जेव्हापासून बुद्धिमान माणूस पृथ्वीवर वावरायला लागला तेव्हापासूनच त्याने दृश्य-अदृश्य शक्तींना कधी भक्तिभावाने तर कधी भीतीभावाने पुजायला सुरवात केली. हळूहळू जशी बौद्धिक क्षमता वाढू लागली तशी त्याने अजून आणि अजून सुंदर मंदिरांची निर्मिती सुरु केली. खरतर मंदिर ही कल्पनाच किती सुंदर आहे. भारतीय स्थापत्यातील एक महत्त्वाचा स्थापत्य प्रकार म्हणजे मंदिर स्थापत्य.प्राचीन काळी ही मंदिर म्हणजे सामाजिक आणि सांस्कृतिक गोष्टींची केंद्रे होती. पण त्याही आधी अनेक ठिकाणी डोंगर फोडून त्यामध्ये गुहा करून त्यात मुर्तीची स्थापना केली जात होती.
आपण लहानपणी देवळात जातो. मोठेपणी जातोच असे नाही.पण देवळांबद्दलचे एक आकर्षण मनात घर करून रहातेच. ही भावना सर्व भारतीयांच्या मनात शेकडो वर्षे घर करून राहिली आहे.त्यामुळे क्षेत्रांमध्ये शेकडो देवळे आढळतात. हिंदू धर्मात अनेक देव असल्याने त्यात भर पडते. वर्षानुवर्षे कलाकारांनी अपार कष्ट करून जागतिक दर्जाच्या कलाकृती निर्माण केल्यामुळे देवळे भक्तांचीच नव्हे तर पर्यटकांचीही आकर्षणे ठरली आहेत. तर अशी ही देवळे बांधावयास सुरवात तरी केंव्हा झाली ? किंवा असे विचारले की सर्वात पुरातन देऊळ पहावयाचे असेल तर ते कोणत्या शतकातील असेल ? माझी खात्री आहे बहुतेकांचा अंदाज चुकीचा असेल. बरेच जण सांगतील.पण इतिहास असं नाही म्हणत, सध्या असलेल्या माहिती नुसार त्या काळात मंदिरांची निर्मिती भारतीय उपखंडात तरी अजून झालीच नव्हती. आता अर्थातच आपण सध्या भारतातील प्रसिद्ध हिंदू मंदिरशैलींबद्दलच बोलतो आहोत. इ.स. पूर्वी किमान ४००-५०० वर्षे. या काळातील बौद्ध स्तुप, विहार,चैत्य आपल्या समोर आहेत. पण देऊळ म्हणाल तर आपल्याला इसवी सनाच्या तिसऱ्या शतकापर्यंत पुढे यावे लागते. कारण अगदी साधे आहे.बुद्ध-जैन धर्मांच्या आधी धर्म होता तो "वैदीक धर्म".त्यात इंद्र, वरूण इत्यादी देवता होत्या, यज्ञ होता, पण या गोष्टी देवालय बांधावयाला सोयिस्कर नव्हत्या.

गेल्या शतकात मुर्तीपुजेच्या प्राचीनत्वाचा शोध घेण्यासाठी जे संशोधन झाले, त्यात भारतीय मंदीर स्थापत्याला कशी व कधी सुरवात झाली, याचाही शोध घेण्यात आला. भारतात सापडलेल्या प्राचीन मुर्ती बुध्दाच्या व कुषाणकालीन असून त्या अनुक्रमे गंधार व मथुरा शैलीत आहेत. त्यामुळे मुर्तीपुजा व मंदीरस्थापत्य या बाबी भारतीयांनी ग्रीकांकडून किंवा भारताच्या वायव्य परिसरात वस्ती करुन असलेल्या ग्रीकादभव संस्क्रुतीकडून आल्या असाव्यात असे गृहित धरण्यात आले आहे.कारण वैदिक संस्कृतीत देवांना आहुती द्यायची असेल तर यज्ञात आहुती दिली जाई. म्हणजे अग्नी त्या आहुती देवांपर्यंत पोहचवतो, अशी धारणा होती. त्यामुळे यज्ञविधी हाच पुजेचा एकमेव प्रकार होता. मुर्तीपुजेचे उल्लेख वेदामध्ये आढळत नाहीत. त्यामुळे देवाच्या मुर्ती बनवणे व मुर्तीसाठी वास्तु म्हणजेच मंदीर बांधणे हि संकल्पनाच वेदकाळात माहिती नव्हती. अर्थात याबाबत तज्ञांंध्ये मतांतरे आहेत. युरोपियन तज्ञांच्या मते जशी मुर्तीपुजा वैदीक धर्माला ज्ञात नव्हती, त्याचप्रमाणे त्यानंतर निर्माण झालेल्या जैन व बौध्द धर्मियांनाही हि संकल्पना नवीन होती. मात्र युरोपियन तज्ञांचे हे मत भारतीय विद्वांनानी विशेषत आनंद कुमारस्वामी यांनी पुरावे सादर करुन मुर्तीपुजा व मंदीर स्थापत्याची मुळे सुरवातीच्या काळात प्रचलित असलेल्या यक्षपुजेत असल्याचे दाखवून दिले.
याबबत सपुंर्ण अभ्यास करण्यासाठी धार्मिक वाहमय, उत्खननात आढळलेले पुरावे, कालएतिहासिक वस्तु आणि पुरावस्तु याचा सकल अभ्यास केल्याने असे लक्षात आले कि इसवी सनाच्या पहिल्या दोन शतकात वैदीक, जैन आणि बौध्द अश्या विवीध धर्मीयांना देवाच्या सगुण उपासनेची तीव्र गरज भासली
अर्थात मुर्तीपुजा सुरु झाली तरी मुर्तीचे स्वरुप कसे असावे, तीची वैशिष्ट्ये काय असावीत ? हे सर्व स्थानिक कलाकारांवर अवलंबून होते. ज्या भागात ग्रीक धर्माचा प्रभाव होता, त्या परिसरातील लोकांनी शिव, विष्णु किंवा बुध्दाची मुर्ती ग्रीक देवतेशी साम्य असलेल्या स्वरुपात साकारली. तर ज्या प्रेदेशात हा ग्रीकांचा प्रभाव नव्हता, त्यांनी या मुर्ती साकारताना आधीपासून प्रचलित असलेल्या यक्षमुर्तींशी साम्य असलेल्या असलेल्या स्वरुपात साकारल्या. सुरवातीच्या काळात बांधलेली मंदीर म्हणजे दगडी फरशी किंवा शिळाफलकावर देवाची मुर्ती आणि सभोवताली दगडी कठडा हे सर्व एखाद्या झाडाखाली असत. यामध्ये मुर्तीच्या खाली असलेल्या शिळेवर त्या देवतेचे वाहन कोरलेले असे. तसेच प्राचीन काळी पुजा केल्या जाणार्या देवतांना एखाद्या स्तंभावर कोरले जाई. या स्तंभाना ध्वज म्हणण्यात येई.या ध्वजावर म्हणजेच स्तंभावर जे लांछन कोरलेले असे त्यावरुन त्याच्या नावापुढे ध्वज हा शब्द लावून त्या राजाचे नाव घेतले जाई. उदा. गरुडध्वज, मकरध्वज. श्रीकृष्णाचा नातु प्रद्युम्न मकर हे लांछन वापरत असे म्हणून त्याचा उल्लेख भागवतात मकरध्वज म्हणून येतो. श्रीविष्णु गरुडध्वज तर बलराम तालध्वज म्हणून पुराणात विख्यात आहेत.
या पुजास्थानाचे वेगळेपण दिसावे व त्याचे संरक्षण व्हावे म्हणून त्याभोवती दगडी कठडा असे. राजस्थानातील घोसुंडी येथील स्तंभावर इ,स. पुर्व पहिल्या शतकातील शिलालेख आहे. त्यात नारायण नामक देवाच्या पुजास्थानाभोवती म्हणजे नारायण वाटीक भोवती उभारलेल्या दगडी कठड्याचा उल्लेख, गुड्डीमल्लम येथे सापडलेले कायालिंग, सांची, भारहुत येथे दगडात कोरलेली अश्या प्रकारची उदाहरणे म्हणजे मंदिर स्थापत्याची प्रारंभिक स्थिती आहे. या पुज्य वास्तु म्हणजे प्राथनिक काळातील मंदीर आणि त्याच्या परिसरात असणारी झाडे यांच्याभोवतॉ असलेल्या झांडाच्या भोवती दगडाचा वापर करुन प्रकार म्हणजे संरक्षक भिंत बांधलेली असे. याचा पुरातत्वीय पुरावा म्हणजे तात्कालीन नाण्यावर असे चित्र बघायला मिळते. अगदी त्याकाळच्या मंदीर म्हणजे झाडाखाली असलेल्या मुर्तीवर दगडाचे छत घातले जाइ. अर्थात झाडे वाढली कि ती छत तोडून बाहेर पडत. हे माहिती असून देखील असेच छत घातले जाई. याचा अर्थ त्याला काहीतरी धार्मिक मह्त्व असले पाहिजे.
पुढे मंदीराच्या स्थापत्याचा विकासाचा पुढचा टप्पा गाठला गेला. सुरवातीला मंदीराचे स्वरुप जे एखाद्या पर्णकुटीसारखे होते, ते त्यात बदल होउन पुजेचे धार्मिक विधी करण्यासाठी तसेच पुजाविधी करण्यासाठी एकत्र जमणार्या लोकांसाठी पुरेशी जागा उपलब्ध करुन देण्यात आली. याचा पुढचा विकासाचा टप्पा म्हणजे सुरवातीला जे गर्भगृह आणि मंडप असे मंदीराचे स्वरुप होते, त्यात प्रदक्षिणापथाची भर पडली. साध्या पर्णकुटीचे रुपांतर चापाकार मंदीरात झाले. या स्थापत्य शैलीचा प्रभाव पडून बौध्द लेण्यात अशीच रचना करण्यात आली, जी आजही बघायला मिळते.
यापुडे मात्र मंदीर हे फक्त देवाचे गृह न रहाता त्याला प्रासादाचे म्हणजे राजवाडयाचे स्वरुप मिळाले. राजा हा विश्वातील महत्वाची कार्ये करणार्या आठ देवांचा म्हणजेच लोकपालांचा पृथ्वीवरील प्रतिनिधी आहे, अशी समजुत होती. त्यामुळे राजा हे देवांचा प्रतिनिधी असून प्रासादात रहातो, तर देवाचा निवास अस्णारे मंदीर हे अनेकमजली असावे हि स्संकल्पना ओघाने आलीच. देवाची दिनचर्याही राजाशी मिळतीजुळती ठेवण्यात आली. उदा. दर चार घटकानंतर देवळात नगारा वाजवण्यात येउ लागला. यालाच चौघडा म्हणतात. भुपाळ्या म्हणून त्याला उठवणे व रात्री झोपवणे, रात्री नैवेध्द्य दाखवणे, त्याची संगीत व नृत्याद्वारे करमणुक करणे हे दिनचर्येचे भाग होते. या सर्व उपचारांना अंगभोग आणि रंगभोग अशी नावे आहेत. देवाला असे राजाचे स्वरुप प्राप्त झाल्यामुळे पुजाविधीमध्ये अनेक राजोपचारांचा समावेश झाला. हे सर्व राजोपचार यथासांग पार पडावेत यासाठी मंदीराच्या तलविन्यासात काही बदल घडून आले. मंडप आणि गर्भगृह याच्यामध्ये अंतराळाची योजना करण्यात आली. आणि मंडपामध्ये नृत्याकरिता एका चौकाची म्हणजे रंगमंड्पाची भर पडली. देवाचा निवास अनेक मजली असावा अशी अपेक्षा असली तरी दरखेपेला असे अनेक मजली मंदीर बांधणे शक्य नव्हते, मग त्यावर मार्ग म्हणून शिखर अनेकमजली उभारण्याची संकाल्पना पुढे आली. तसेच गर्भगृहाच्या दोन्ही बाजुला द्वारपाल किंवा प्रतिहारी आले.
मंदीर विकासाच्या या पुढच्या टप्प्यात खुद्द ब्रम्हांडाचे प्रतिक बनले. इ.स. दहाव्ता ते अकराव्या शतकात मंदीराचे गर्भगृह हे देवाचे शरीर मानल्यामुळे मंदीराच्या नाहेर व आतल्या बाजुला त्या देवयेच्या परिवरातील देवता कोरण्यात आल्या. मंदीराच्या विकासाच्या पुढच्या टप्प्यात मंदीर नगराचा उद्य झाला. मंदीराच्या तटबंदीत संपुर्ण शहर वसवले जाई व मुख्य मंदीर नगराचे केंद्र बनले.
पुर्णपणे विकसित मंदीरात अनेक गोष्टींची भर पडल्यामुळे त्यामध्ये भारतीय किंवा हिंदु जीवनाचे घटक, त्यातील फेरफार हे सर्व दिसून येतात. अर्थात मंदीर स्थापत्याच्या विकासाचे हे टप्पे भारतातील सर्व मंदीराचा विचार करुन मांडल्ले असल्यामुळे वरील स्थापत्याच्या विकासाच्या अवस्था दिसणारी मंदीरे महाराष्ट्रात दिसतील असे नाही. मंदीर स्थापत्याच्या सुरवातीच्या कालखंडात जे तंत्र स्थपतींनी वापरले ते समजावून घेणेही महत्वाचे आहे. इ.स.पहिले शतक ते दहावे शतक म्हणजे सातवाहन आणि कुषाण काळ यामध्ये मंदीराच्या बांधकामासाठी पक्क्या वीटांचा वापर केलेला दिसतो. दहाव्या शतकापर्यंत हे तंत्र विकसित होत गेले. यामुळे काही उंच आणि भव्य मंदीरे याच वीटांचा वापर करुन बांधली.
वैदिक काळानंतर येणारा महत्वाचा कालखंड म्हणजे नंद राजघराण्याचा काळ इ.स.पूर्व ५०० ते ३५०. या काळात मूर्ती तसेच प्रतिमांचा ऐतिहासिक साधनांत उल्लेख येऊ लागतो. मौर्यकाळातही म्हणजे नंदांनंतर १५० वर्ष पर्यंतही मूर्तीपूजा प्रचलित होती मात्र कोणत्याही साधनांत मंदिरांचा उल्लेख मात्र येत नाही.
पुराणांनी जेव्हा शंकर, विष्णु असे "सगुण" देव "हिंदू" धर्माला दिले तेंव्हा देवळे बांधावयाची सोय झाली. पहिल्यांदा मूर्ती आली व नंतर तीचे घर.आधीच्या वाङ्मयात उल्लेख असले तरी दगड विटांची टिकावू देवळे उभारावयाची वेळ तिसऱ्या शतकातच आली. शंख-चक्र-गदा-पद्मधारी मूर्तीची पूजाअर्चा करावयाची तर गाभारा पाहिजे, चार लोकांना बसावयाला मंडप पाहिजे, प्रदक्षणा मार्ग पाहिजे. बस, सुरवातीच्या देवळात एवढीच सोय होती. मध्य प्रदेशातील तिगवा "कंकाली मंदिर" सर्वात जून्या देवळातील एक. गाभारा बाहेरून पावणेचार मि.लांब-रूंद, आतल्या बाजूने अडीच मि.चौरस.समोरचा मुखमंडप पावणेचार मि.लांब व पावणेदोन मि. रुंद आहे. चार स्तंभ, त्यावर पूर्ण कलश व सिंहाच्या मूर्ती. सपाट छप्पर.द्वाराभोवती गंगा- यमुनेच्या मूर्ती. पूजेला आवश्यक तेवढ्याच भागांचा समावेश. पण सुरवात जरी अशी साधी-सुधी असली तरी पुढील प्रगती भराभर झाली.याचे कारण परत अगदी साधे. बौद्ध-जैन स्थापत्यकलेमुळे कलाकार कलेत आणि तांत्रिक बाबतीत परिपूर्ण होते. काय करावयाचे सांगा. कसे करावयाचे आम्ही बघू. बुद्ध हवा? बुद्ध घ्या. शंकर हवा? शंकर घ्या; तितकाच सुंदर. काय बांधावयाचे, कसे बांधावयाचे ते ठरवण्यास एक दोन शतके लागली. हा काळ चाचपणीचा (trial and error) होता. निरनिराळ्य़ा शैलींचा उगम या काळातीलच. भारतात जरी गुप्तकाळामधील म्हणजे इ. स. चौथ्या, पाचव्या शतकापासून मंदिरांचे अवशेष आढळत असले तरी त्याआधीच्या काळातही मंदिर निर्मिती होत होती हे उत्खननात सापडलेल्या काही अवशेषांवरून लक्षात येते, तर गुप्तकालापूर्वीच्या काही शिलालेखांतून मंदिर निर्मितीचे उल्लेखही आढळून आले आहेत. इ. स. पूर्व तिसऱ्या शतकातील कौटिल्याच्या अर्थशास्त्र या ग्रंथातही मंदिरांचे उल्लेख आढळतात.
एखादं जुनं हिंदुमंदिर बघताना आपल्यापैकी काही जणांना तरी प्रश्न पडत असेल की या मंदिराचं स्थापत्य असंच का आहे? या कोनाड्यात हीच मूर्ती का बसवली आहे? काही मंदिरांमध्ये गर्भगृहाच्या दरवाजाच्या, म्हणजे द्वारशाखेच्या, दोन्ही बाजूंना गंगा आणि यमुना या नदीदेवतांच्या मूर्ती दिसतात, त्यांचं प्रयोजन काय? उत्तरेकडची बहुतेक सारी मंदिरं एका विशिष्ट पद्धतीनं का बांधलेली असतात? उत्तरेकडच्या आणि दक्षिणेकडच्या मंदिरांमध्ये काही गोष्टी सारख्या असल्या तरी नवशिक्या नजरेलाही दोन्हीकडच्या मंदिरांच्या स्थापत्यातला फरक एका नजरेत कळू शकतो, त्यामधले बारकावे समजत नसले तरी. या दोन्ही स्थापत्यशैली वेगळ्या का आहेत? हे प्रश्न आपल्यापैकी बहुतेकांना कधी ना कधी पडलेले असतीलच.
आपल्या पूर्वजांनी जेव्हा अथक् प्रयत्नांनी इतकी मोठी मंदिरं बांधली तेव्हा त्या संपूर्ण वास्तूमागं एक फार मोठा धर्मविचार होता. मंदिराच्या वास्तूतल्या विविध मूर्ती, मंदिराचे रंगमंडप, द्वारशाखा, शिखर, गर्भगृह, प्रदक्षिणापथ असे विविध भाग, मंदिरावर कोरलेली प्रतीकं, शिलालेख, विविध शिल्पं या प्रत्येकाचं एक विशिष्ट प्रयोजन होतं.मंदिर हे देवाचं पृथ्वीवरचं आलय तर आहेच; पण मंदिर ही एक फार महत्त्वाची सामाजिक संस्थासुद्धा आहे. मंदिरात देवदर्शनासाठी येणाऱ्या भाविकांना धर्मविचार सोपेपणानं समजावा, आपली संस्कृती, आपलं धर्मज्ञान सर्वसामान्य माणसांना सहज कळावं यासाठी मंदिरांचं बांधकाम एका विशिष्ट पद्धतीनं केलं जात होतं. अगदी आजही भारतात नवीन मंदिरं बांधताना या सर्व गोष्टींचा विचार करूनच मंदिरांचं बांधकाम केलं जातं. अयोध्येत बांधण्यात येणारं भव्य राममंदिर हे प्राचीन मंदिरस्थापत्याचा विचार करूनच बांधलं जाणार आहे.
"खरं तर कुठल्याही अभिजात कलेप्रमाणे मंदिरस्थापत्यकलेचीही एक परिभाषा असते. अभिजात संगीत समजून घ्यायला जशी त्याची परिभाषा आधी समजून घ्यावी लागते, तसंच मंदिर बघतानाही तिथलं स्थापत्य समजून घ्यायला शिकावं लागतंआपल्या मंदिरांमधून जेव्हा भव्य-दिव्य अशी पौराणिक कथांवरची शिल्पं कोरली गेली तेव्हा त्यांचं प्रयोजन केवळ देव-देवतांपुढं लोकांनी नतमस्तक व्हावं एवढंच नव्हतं. धार्मिक श्रद्धा जोपासण्याबरोबरच लोकांना रामायण-महाभारत या महाकाव्यांबद्दलची माहिती मिळावी, त्यांना आपल्या धर्माचं शिक्षण मिळावं, भोवतालचं जग, प्राणिसृष्टी, झाडं-झुडपं, तत्कालीन लोकसंस्कृती, वेशभूषा, साहित्य, पर्यावरण अशा सर्व गोष्टींचं दर्शन लोकांना व्हावं असा मंदिर निर्मिणाऱ्या लोकांचा हेतू असायचा. मंदिरात येताना माणसानं बाह्य सृष्टीकडे लक्ष द्यावं आणि आत गाभाऱ्यात मात्र पूर्णपणे अंतर्मुख व्हावं आणि सर्व लक्ष देवावर केंद्रित करावं असा काहीसा भाव मंदिरनिर्माणकर्त्यांच्या मनात असावा. म्हणूनच अगदी कामशास्त्रापासून ते प्राणिसृष्टीपर्यंतची शिल्पं आपल्याला जुन्या मंदिरांच्या बाह्य भिंतींवर दिसू शकतात; पण आतला गाभारा मात्र अगदी साधा आणि अनलंकृत असतो. केवळ आराध्यदेवतेची मूर्ती आणि तेलाचे मंद तेवते दिवे इतकंच गर्भगृहात असावं असा शिल्पशास्त्राचा संकेत आहे आणि दक्षिण भारतात तो संकेत आजही कटाक्षानं पाळला जातो.
ईश्वरोपासनेसाठी शैलगृहं बांधण्याची भारतीय परंपरा फार प्राचीन आहे. अगदी इसवीसनपूर्व तिसऱ्या शतकात डोंगरात-कातळात कोरलेल्या लेणी आपल्याला आजही बिहारमध्ये गयेजवळ बघता येतात; परंतु भारतातल्या मंदिरस्थापत्याचा विचार करताना आपण वाचतो, की गुप्त काळात म्हणजे ‘कॉमन इरा’च्या चौथ्या शतकात बांधलेली मंदिरं आज भारतात अस्तित्वात असलेली सर्वात प्राचीन मंदिरं आहेत. साधारणतः दीड हजार वर्षापूर्वी दगड-विटांनी बांधलेली ही प्राचीन मंदिरं आजही आपल्याला मध्य प्रदेशातल्या सांची आणि भितरगाव या ठिकाणी पाहायला मिळतात. अर्थात्, ही मंदिरं अगदी साधी आहेत. पुढं मंदिरस्थापत्यशास्त्र जसजसं प्रगल्भ होत गेलं तसतशी मंदिरं अधिकाधिक भव्य होत गेली. आज आपण जेव्हा तंजावरमधलं हजार वर्षं जुनं असलेलं बृहदीश्वराचं भव्य मंदिर बघतो तेव्हा आपली छाती ते अद्भुत मंदिर बघून दडपूनच जाते. भारतीय द्रविड स्थापत्यशैलीचा सर्वात प्रगत आविष्कार या मंदिरात बघायला मिळतो. सांची ते तंजावर हा भारतीय मंदिरस्थापत्यशास्त्राचा पाचशे वर्षांतला प्रवास हा खरोखरच स्तिमित करणारा आहे.
मंदिरस्थापत्य हे शास्त्र फार अभ्यासानंतर विकसित झालेलं शास्त्र आहे हे आपण कुठलंही प्राचीन मंदिर बघताना लक्षात घेतलं पाहिजे. कुठल्याही मंदिरात असलेली कोणतीही मूर्ती, प्रतिमा, मंदिराचे वेगवेगळे भाग हे सगळं मंदिरनिर्मात्यांनी, त्यांच्या मनात आलं म्हणून, उगाचच घडवलेलं नाही. मंदिर म्हणजे देवाचं घर. मानवी जीवनाचं नियंत्रण करणाऱ्या देव-देवतांचं प्रतीकरूपानं अथवा मूर्तींच्या रूपानं भाविकांना दर्शन घडवणारं मानवानंच निर्मिलेलं आलय म्हणजे मंदिर.
साधारण इ.स.पूर्व ११० दरम्यान नारायण वाटक ( म्हणजेच मंदिर ) बनवल्याचा उल्लेख एका अभिलेखात येतो. तसेच मध्य प्रदेशातील विदिशा नगरी जवळ उत्खननात इ.स.पूर्व ११३ मध्ये हेलिओडोरस या स्वतःला भागवत म्हणवणाऱ्या ग्रीक राजदूताने बनवलेल्या गरुडध्वज खांबाजवळच एका चापाकृती मंदिराचे अवशेष मिळाले. ह्या सुरवातीच्या काळात मंदिर डोलमेन प्रकारचे असायचे. म्हणजे तीन उभ्या फरश्या आणि वरून आडवी एक फरशी छतासारखी टाकून एक लहानशी पडवी बनवली जात असावी.
डोलमेन
आज ज्या वास्तूला आपण मंदिर म्हणून ओळखतो तश्या प्रकारच्या मंदिर वास्तूच्या बांधणीची खरी सुरवात गुप्त काळापासून होते म्हणजे साधारण इ.स. ५००-६०० दरम्यान. याच काळातील एक मंदिर मध्य प्रदेशात बघायला मिळतं, तीगाव मधलं किकली देवीचं मंदिर हे अगदी गुप्तकाळातील मंदिर शैलीचं उदाहरण आहे. हे मंदिर निराधार मंदिर आहे. आता हे काय असतं ? तर मंदिर आहे म्हटल्यावर प्रदक्षिणा मार्ग तर हवाच ना… जर प्रदक्षिणा मार्ग मंदिराच्या बाहेरून असेल तर ते मंदिर निराधार मंदिर म्हणवले जाते, पण जर मार्ग मंदिराच्या आतमध्येच असेल आणि वरून छताने आच्छादलेला असेल तर ते सांधार मंदिर असते.
कंकली देवी मंदिर, तीगाव, मध्य प्रदेश
सुरवातीच्या काळात मंदिर वास्तू अगदीच गरजेपुरती होती. देवाला ठेवायला गाभारा हवा मग बांधली दगडाची छोटीशी चौकोनी खोली, देवासमोर बसायला छत हवं मग एक छोटासा मंडप बांधून टाकला दगडाचा, बस अजून काय पाहिजे, शिखर नको, ओटा नको, कलाकुसरयुक्त स्तंभ नको. हा या मंदिरात फक्त गाभाऱ्याच्या द्वारपट्टीवर थोडी कलाकुसर केलेली दिसते पण ती ही थोडीशीच. सुरवातीची मंदिरे अशीच, पण त्या मंदिर स्थापतींचे मन भरत नव्हते. हळू हळू मंदिरे फक्त देवाच्या पूजेची जागा ना राहता ग्रामातील एक सामाजिक स्थळ बनू लागले. त्याच सोबत मंदिरांनी कात टाकायला सुरवात केली आणि इ.स. १००० पासून ते इ.स. १४०० पर्यंत मंदिर वास्तुकलेची उच्चतम पातळी गाठली गेली. गुप्त, मगध, चंदेल, सोळंकी, गंग, राष्ट्रकूट, शिलाहार, चालुक्य, होयसाळ, पल्लव, चोल, विजयनगर या आणि अश्या अनेक राजवटींनी मंदिर बांधणीला चालना दिली आणि या कलेचा उत्तरोत्तर विकास केला.
आता आपल्या मूळ विषयाला हात घालू तो म्हणजे ही मंदिरं कशी बघावी, त्यांत काय बघावं आणि कसं ओळखावं आणि या मंदिरांचे प्रकार कोण कोणते असतात. लिहिण्याच्या सोयीसाठी लेखाचे दोन भाग करूया, १.मंदिराचे भाग , २.मंदिरांचे प्रकार.
हिंदुमंदिराच्या वास्तूच्या प्रत्येक भागामागं हिंदू धर्मतत्त्वज्ञान तर आहेच; पण एक निश्चित अशी वैज्ञानिक बैठकसुद्धा आहे. मंदिरात येणाऱ्या भाविकांना काही गोष्टी समजल्या पाहिजेत असा विचारही आहे आणि मंदिरात आलेल्या माणसाला कलास्वाद घेता आला पाहिजे अशी अपेक्षाही आहे.
मुळात कुठलीही भारतीय कला - मग ती गायन, वादन, नृत्य, चित्रकला, वस्त्रकला, शिल्पकला - अशी कुठलीही असो, ‘केवळ कलेसाठी कला’ हा भारतीय कलेचा उद्देश कधीच नव्हता. संत तुलसीदासांची एक प्रसिद्ध चौपाई आहे :
राम नाम मनिदीप धरु जीह देहरीं द्वार।
तुलसी भीतर बाहेरहुँ जौं चाहसि उजिआर॥
म्हणजे, रामनाम हा देहा-मनाच्या उंबरठ्यावर ठेवलेला असा दीप आहे की ज्याचा प्रकाश शरीराच्या आतही पडतो आणि बाहेरही.
भारतीय मंदिरस्थापत्यकलेचंही तसंच आहे, एखादं मंदिर बघताना, त्यावर कोरलेली अद्भुत शिल्पं समजून घेताना आपली दृष्टी तर दिपून जातेच; पण मंदिर भाविकाना एक आत्मिक समाधानही देतं.
‘भारतीय कलेचं सगळ्यात मोठं वैशिष्ट्य म्हणजे रसनिष्पत्ती. ही रसनिष्पत्ती दोन्ही बाजूंनी असावी लागते, म्हणजे एखादी कलाकृती निर्माण करताना त्या कलाकाराला स्वतःला रसानुभूती व्हावी लागते आणि त्या कलाकृतीचा आस्वाद घेणाऱ्या व्यक्तीला म्हणजे रसिकालाही त्याच रसाची अनुभूती व्हावी लागते तरच त्या कलाकृतीमागचं प्रयोजन सिद्ध होतं,’ असं भारतीय सौंदर्यशास्त्राचे थोर अभ्यासक आनंद कुमारस्वामी यांनी म्हटलं आहे. भारतीय स्थापत्यशास्त्राचंही हेच वैशिष्ट्य आहे. कोणत्याही कलेचा आस्वाद घेणं ही अत्यंत एकाग्र होऊन करायची क्रिया आहे, मग मंदिरस्थापत्य तरी त्याला अपवाद कसं असेल? पण या निरामय आस्वादासाठी रसिकाचं मन भाविक तर असलं पाहिजेच; पण त्याचबरोबर संस्कारितही असलं पाहिजे.
भारतात दगड, विटा, लाकूड, चुना, इत्यादींच्या सहाय्याने मंदिरनिर्मिती केलेली आढळून येते. अनेकदा मंदिराचा मुख्य भाग दगडात तर शिखर विटांमध्ये बांधल्याचे दिसून येते. संपूर्णपणे विटांनी बांधलेले भितरगाव (उत्तर प्रदेश) येथील गुप्तकाळातील मंदिर अजूनही पंधराशे वर्षे उभे आहे. तर महाराष्ट्रात तेर या गावातील उत्तरेश्वर आणि कालेश्वर ही प्राचीन मंदिरे संपूर्णपणे विटांनी बांधलेली आहे. या दगड–विटांनी बांधलेल्या मंदिरांवर शंखपूड, चुना इत्यादींच्या मिश्रणाने तयार केलेला लेप दिला जात असे. तसेच विटांच्या मंदिरांवर याच मिश्रणातून तयार केलेल्या मूर्तीदेखील बाह्यभिंतींवर लावल्या जात असत. गुप्तकाळातील मंदिरांचे स्वरूप अगदी साधे म्हणजे चौकोनी गर्भगृह (गाभारा) आणि असल्यास त्यापुढे छोटासा दोन खांबांचा मंडप असे होते.
मंदिरस्थापत्यातली प्रत्येक बारीकसारीक गोष्ट आपल्याला काहीतरी संदेश देण्यासाठी किंवा काहीतरी शिकवण्यासाठी विचारपूर्वक घडवलेली असते. उदाहरणच द्यायचं झालं तर, मंदिराची जगती किंवा जोतं हे सहसा आजूबाजूच्या जमिनीच्या समतलापासून चांगलंच वर धरलं जातं. काही पायऱ्या चढूनच आपल्याला मंदिरात प्रवेश करता येतो. आपल्या मर्त्य जीवनाच्या पातळीपेक्षा देवाची पातळी वरची आणि म्हणूनच देवदर्शनाला जाताना आपणही स्वतःची आध्यात्मिक पातळी वाढवून स्वतःला त्यायोग्य करावं हा त्यामागचा विचार. खजुराहोमधल्या लक्ष्मणमंदिराचं जोतं प्रचंड उंच आहे.
बऱ्याच मंदिरांमध्ये बाह्य भिंतीवर आकर्षक विभ्रम असणाऱ्या सुंदर स्त्रियांची शिल्पं असतात. त्यांना ‘सुरसुंदरी’ किंवा ‘शालभंजिका’ असं म्हटलं जातं. काही मंदिरांच्या बाह्य भिंतींवर मैथुनशिल्पं असतात. ही सर्व शिल्पं म्हणजे मानवाच्या भौतिक आयुष्याचं प्रतीक आहेत. मानवी आयुष्यातले काम, लोभ आदी विकार हे अशा प्रतीकांच्या रूपानं मंदिराच्या बाहेरच्या भागावर दाखवले जातात. ते सर्व विकार बाहेर ठेवून भक्तानं ईश्वराच्या ठाई चित्त ठेवून मंदिरात प्रवेश करावा असा धर्मविचार यामागं होता, म्हणूनच गर्भगृहाच्या द्वारशाखेवर दोन्ही बाजूंना गंगा-यमुना असतात. गंगा ही पावित्र्याचं प्रतीक आणि यमुना ही भक्तीचं. मनातले सर्व क्षुद्र विकार मंदिराबाहेर सोडून भक्तानं पवित्र मनानं देवाच्या दर्शनाला भक्तिपूर्वक यावं हेच जणू त्या गंगा-यमुना भक्तांना सांगत असतात.
साधारणतः पूर्ण विकसित मंदिरस्थापत्यामध्ये मंदिराचे चार भाग असतात, मुख्य आराध्यदेवतेची प्रतिष्ठापना असलेलं गर्भगृह आणि त्यावरचं शिखर हे दोन्ही मिळून मंदिराचं विमान बनतं. अंतराळ म्हणजे मंदिराचा मुख्य मंडप आणि गर्भगृह या दोहोंमधली चिंचोळी जागा. भाविकानं मुख्य मंडपात संगीत, नृत्य आदी कलांचा आस्वाद घेतल्यानंतर गर्भगृहाकडे वळताना या अंतराळात घटकाभर थांबून चित्त एकाग्र करायचं असतं. मंडप म्हणजे गर्भगृहापुढं असलेलं मंदिराचं मुख्य दालन. हे बहुधा अनेक स्तंभांवर तोलून धरलेलं असतं आणि प्रदक्षिणापथ हा बहुधा जुन्या मंदिरांमध्ये मुख्य मंदिराच्या बाहेर असतो. मंदिरात दर्शनाला आलेल्या भक्तानं आधी मंदिराचं चोहोअंगानी बाह्य दर्शन घ्यावं, मंदिराचं प्रयोजन समजून घ्यावं आणि मगच आत प्रवेश करावा हा त्यामागचा विचार.
कुठल्याही परिपूर्ण मंदिराची - मग ते मोठं असो वा छोटं - सहसा गर्भगृह, त्यापुढं अनेक स्तंभांवर तोलून धरलेला सभामंडप, गर्भगृह आणि सभामंडप यांना जोडणाऱ्या छोट्या जागेत अंतराळ आणि मुख्य मंडपाबाहेर छोटा मुखमंडप अशी आडवी रचना असते. उभ्या रचनेचा विचार केला तर गर्भगृहाच्या वर मंदिराचं निमुळतं होत जाणारं उंच शिखर असतं. गर्भगृहासमोरील मंडपांवर एक तर सपाट छत असतं किंवा शिखर असलंच तर ते मुख्य शिखरापेक्षा साधारण निम्म्या उंचीचं असतं. त्यामुळे मंदिर आणि त्याचं उंच शिखर हे भाविकांना हिमालयाच्या एखाद्या उंच पर्वताप्रमाणे भासतं. मंदिर हा पृथ्वीतलावरील देवांचा प्रासाद असल्यामुळे मंदिराची वास्तू बघताना भाविकांना त्यात देवांचा निवास असलेल्या मेरूपर्वताचा किंवा भगवान शिवांचा वास असलेल्या कैलासपर्वताची प्रतिकृती दिसावी हा त्यामागचा धर्मविचार आहे.
मंदिर म्हणजे दैवी शक्तीच्या प्रतीकरूपातल्या दर्शनाचं आणि उपासनेचं स्थान. हिंदू धर्मातल्या देव-देवता जितक्या विपुल आहेत तितकीच त्यांची मंदिरंही विविध आणि वैशिष्ट्यपूर्ण आहेत. फक्त मंदिरं बघताना मंदिरस्थापत्याचे बारकावे समजून घेतले तर आपलं देवदर्शन तर जास्त सुफल होईलच; पण सुसंस्कृत रसिक म्हणून आपण जास्त अनुभवसंपन्न होऊ यात दुमत नसावं.
मंदिर स्थापत्याचा विकास काळाप्रमाणे होत गेला. पूर्वी अनेक ठिकाणी डोंगर फोडून त्यामध्ये गुहा करून त्यात मुर्तीची स्थापना केली जात असे, यालाच गुहा मंदिर म्हणतात. मुर्ती ही पुजनीय असल्यामुळे त्यासाठी पवित्र वास्तूची निर्मिती झाली पाहिजे अशी भावना हळुहळू समाजामध्ये विकसित होत गेली. तेव्हांची मंदिरांची रचना ही एखाद्या सर्वसामान्य घरासारखी होती. गुप्तकालिन मंदिर ही एक खोली व तिच्या पुढिल लहानसा सोपा म्हणजे व्हरांडा अशी होती. यथावकाश भक्तीचा प्रभाव वाढत गेला त्यातच "तत्वज्ञान नि अध्यात्म" यांचा विचारही महत्वाचा ठरला. त्यामुळे स्थापतींना अशी जाणीव झाली की, सामान्य घरांपेक्षा मंदिर ही वेगळी असली पाहिजेत आणि हळुहळू मंदिरांच्या रचनेत बदल होत गेला. खोलीवजा घराच रुपांतर कळस, सभामंडप, मुखमंडप, इत्यादी घटकांनी युक्त स्थापत्यात झाले. मंदिरांच्या वास्तू्चे स्वरुपही बदलायला लागले, त्याचे एक कारण म्हणजे त्याच्यातून प्रतिष्ठापित केल्या जाणार्या मुर्तीचे शास्त्र ही काळानुसार प्रगत होत गेले.
भारतीय तत्वज्ञान आणि धर्मशास्त्र यांचे साकार रुप म्हणजे "मुर्ती'. जसा या सकल्पनेचा विस्तार वाढत गेला तसा मंदिरांच्या वास्तूत आमुलाग्र बदल होत गेला. "देवघर' व्यक्ती वा कुटुंबासाठी तर 'मंदिर' समूहासाठीच झाले. त्यामुळे सहाजिकपणे सभामंडापाचा आकार वाढला. भक्तांची संख्या वाढली तशी प्रवेशद्वारांची संख्या सुध्दा वाढली. एका ऎवजी मंडपाच्या तीन बाजूंना तीन दरवाजे तयार करण्यात येऊ लागले. प्राचीन काळी ही मंदिर म्हणजे सामाजिक आणि सांस्कृतिक गोष्टींची केंद्रे होती. त्यावेळी या मंदिरांमधून एकूण १८ विभाग कार्यरत असत. तेथे पाठशाळा चालत, त्यांच्या प्रांगणात व आजुबाजूला बाजार भरे, गाभार्यातीला देवदेवतांच्या सन्मुख राहून मंडपाच्या मध्यभागी प्रवचन, किर्तन, भजन, गायन वादन, नर्तन केले जावे अशी योजना केली गेली. या प्रकारच्या सेवेला "रंगभोग" म्हणतात. मंडपाच्या मध्यभागी असणार्या शिळेला "रंगशिळा" त्यामुळेच म्हणतात.
मंदिरातील १८ विभाग खालील प्रमाणे आहेत.
1)वास्तुकला 2) चित्रकला 3) शिल्पकला 4) किर्तन 5) नृत्यकला 6) धर्मसभा 7) धर्मविवेचन 8) संगीत 9) आयुर्वेदीक वनस्पती 10) गोशाळा 11) अतिथीगृह 12) धर्मकार्ये 13) प्राणिसंग्रह 14) ध्यानमंदिर 15) खलबत खाना 16) ग्रंथालय 17) अनाथ बालसंगोपन 18) पाठशाळा.
मंदिराचा मुख्य भाग म्हणजे गर्भगृह (गाभारा). हा जाड भिंतींचा, चौकोनी असतो जिथे शिविलग किंवा मुख्य देवतेची मूर्ती स्थापन केलेली असते. प्रासाद किंवा मंदिर हे या गर्भगृहाचे कवच असते त्यामुळे अनेकदा प्राचीन मंदिरांची पुनर्बाधणी झाली तरी गाभारा हा मूळचाच ठेवलेला असतो. या गर्भगृहाच्या वरील बाजूला प्रमाणबद्ध शिखर असते.
मंदिरात गर्भगृह, त्यापुढील छोटय़ाशा जागेत अंतराळ, पुढे मंडप अशी आडवी रचना असते तर गर्भगृहाच्या वरच्या बाजूला शिखर असते. गर्भगृहाच्या पुढे असणाऱ्या मंडपांवर शिखरे असली तरी ती गर्भगृहावरील शिखरापेक्षा कमी उंचीची असतात. मंदिर आणि मंदिराचे शिखर हे लांबून बघितल्यावर एखाद्या पर्वताप्रमाणे भासते अशी कल्पना केलेली आहे. इ. स. सहाव्या शतकात वराहमिहिराने लिहिलेल्या बृहत्संहिता या ग्रंथात तसेच मत्स्यपुराणात विविध प्रासादांचे प्रकार सांगताना त्यासाठी मेरू, मंदार आणि कैलास अशी पर्वतांची नावेही वापरली आहेत. मेरू पर्वत हा पृथ्वीचे नाभिस्थान आहे, मंदार पर्वत हा सागरमंथनात सागर घुसळण्यासाठी कूर्माच्या पाठीवर ठेवला होता, तर कैलास पर्वतावर शंकराचा निवास असतो अशा प्राचीन भारतीय संकल्पना आहेत. त्यामुळे भारतीय मंदिर हे अनेकदा पर्वताप्रमाणे विशेषत: मेरू पर्वताप्रमाणे पृथ्वीचा मध्य असल्याचे दाखले दिले जातात.
गर्भगृहात जिथे शिविलग किंवा मूर्ती स्थापन केलेली असते त्यावरच मुख्य शिखर असते. ही मूर्ती अथवा शिविलग ज्या पीठावर स्थापन केलेले असते त्या पीठाच्या केंद्रिबदूपासून ते शिखराच्या अखेरच्या टोकापर्यंतच्या बिंदूपर्यंतची अदृश्य रेखा त्या मंदिराचा अक्ष मानला जातो. मंदिराच्या शिखराच्या केंद्रिबदूपासून ती रेषा अनंतात एका बिंदूपर्यंत जाऊन भिडते. ही गर्भगृहातील मूर्तीखालील केंद्रिबदूपासून निघणारी आणि अनंतातील एका बिंदूला जाऊन भिडणारा हा अक्ष हाच जगाचा किंवा विश्वाचा मध्य आहे असे त्या मंदिरापुरते मानले जाते. याच संकल्पनेने ते मंदिर मेरू पर्वताची प्रतिकृती बनते. ही संकल्पना भारतात वापरली गेलीच; पण भारताबाहेर भारतीय संस्कृतीचा प्रसार झाल्यावर आग्नेय आशियात निर्माण झालेल्या मंदिरांमध्येदेखील वापरली गेली. त्यामुळेच कंबोडियातील मंदिरांमध्ये विशेषत: अंकोरवट या मंदिरामध्ये ती विशेषकरून पाहायला मिळते. तंजावर येथील बृहदीश्वर या शिव मंदिराला ‘दक्षिणमेरू’ असे का म्हटले आहे ते या स्पष्टीकरणावरून लक्षात येते.
मंदिर हे देवाचं आलय, आणि देवांचं स्थान हे मर्त्य मानवांपेक्षा वरचं, म्हणून मंदिराचं जोतं किंवा जगती उंच धरली जाते. मंदिरात प्रवेश करण्याआधी या पायऱ्या चढताना भक्तानं आपल्या क्षुद्र वासनांचा, रागा-लोभाचा त्याग करून स्वतःला आध्यात्मिकतेच्या वरच्या पायरीवर आणायचं असतं, म्हणून कामशिल्पं मंदिरात असली तरी सहसा बाहेरच्याच बाजूला असतात.
शिखर आणि गर्भगृहाच्या भिंती बाहेरून कितीही शिल्पमंडित असल्या तरीही गर्भगृह आतून मात्र अगदीच साधं आणि अनलंकृत असतं. अंधाऱ्या गर्भगृहात तेवता लामणदिवा आणि त्या दिव्याच्या सौम्य, मंद प्रकाशात दिसणारी मूर्ती किंवा शिवलिंग हे शरीराच्या अंतरात्म्याचं प्रतीक. त्याचं दर्शन करणं म्हणजे नुसतंच मूर्ती ‘बघून’ येणं नव्हे तर, पंचेंद्रियं एकवटून, एकाग्र चित्तानं त्या मूर्तीत असलेल्या ईश्वरी तत्त्वाचं ध्यान करणं आणि शेवटी तोच दैवी अंश आपल्यातही आहे याची अनुभूती घेणं हे खरं दर्शन.
भक्तीभावाने निर्माण केलेल्या मंदिराच्या निर्मितीने निर्माणकर्त्यांला पुण्य मिळते. मंदिर चिरकाल टिकत असल्याने निर्माणकर्त्यांला चिरकाल पुण्य मिळते आणि तो चिरकाल स्वर्गलोकात राहू शकतो. त्याचप्रमाणे मंदिरात येणाऱ्या भाविकांनादेखील पुण्य मिळते. भाविक विविध खांबांनी, मूर्तीनी नटलेले मंदिर ‘बघायला’ येत नाहीत तर भक्तिभावाने देवाच्या, मंदिराच्या ‘दर्शनाला’ येतात. त्यांच्यासाठी देव आणि मंदिर हे एकरूप झालेले असतात.
अनेकदा प्राचीन मंदिरे, धार्मिक स्थळे सध्या पुजली जात नसल्याने प्राचीन वास्तू म्हणूनच अभ्यासली जातात. मंदिरांवरील मूर्तीची विविध स्थापत्य घटकांची ओळख पटवणे आणि ती सांगणे याच्या जोडीने ही मंदिरे कशी वापरली जात होती किंवा आजही कशी वापरली जातात हा पूजेचा, भक्तीचा भाग मंदिरस्थापत्याच्या अभ्यासात काहीसा दुर्लक्षिला जातो. तो लक्षात घेतला तर त्या मंदिराचा, त्याच्या निर्मिती आणि वापरामागील तसेच बाभिंतींवरील मूर्तीयोजनेमागील अर्थ स्पष्ट होतो.
प्राचीन भारतातील या संपन्न वारशाचा प्रसार हा भारताच्या सध्याच्या भौगोलिक सीमांच्या पलीकडे झालेला होता. प्राचीन भारतीय लिपी, भाषा, धर्म, परंपरा, चालीरीती यांचा प्रभाव केवळ दक्षिण आशियाच नाही तर आग्नेय आशिया तसेच मध्य आशियातील अनेक देशांवर पडला होता. प्राचीन काळात व्यापारानिमित्त सागरी मार्गाने आणि खुष्कीच्या मार्गाने भारतीयांचा अनेक प्रदेशांशी संपर्क आलेला होता. विसाव्या शतकात ‘बृहत्तर भारत’ किंवा भारतीयीकरण झालेली राष्ट्रे म्हणून या सर्व प्रदेशाचा अभ्यास काही प्रमाणात भारतीय अभ्यासकांनी केला.
सुरवातीलाच मी काही पारिभाषिक शब्दांची सूची देतो आहे. त्याची गरज भासेलच असे नाही. पण माहिती असेल तर नागर-द्रविड शैलींमधील बारकावे समजावून घेणे सोपे जाईल.
अर्धमंडप: मंदिराच्या मुख्य मंडपाच्या समोरचा लहान आकाराचा, तीन बाजूंनी उघडा असलेला मंडप.
अर्धस्तंभ: भिंतीत गुंतवल्यामुळे ज्यांचा अर्धाच भाग दृष्टीस पडतो असा खांब.
आमलक: शिखराच्या माथ्यावर येणारे, रायआवळ्यासारख्या खाचा असलेले दगडी चक्र.
उत्क्षिप्त: भिंतीचे पुढे सरकलेले ( फ़ेकलेले म्हणजे क्षिप्त ) काही भाग यांना रथ असे म्हणतात.यांना विसंवादी, मागे सरकलेले, उठाव .देणारे भाग म्हणजे उत्क्षिप्त.
उद्गम: भिंतीवर सजावटीसाठी वापरण्यात येणारे त्रिकोणी रूपक .
अंतराळ: देवळाचा गाभारा आणि मंडप यांच्या मधोमध येणारे दालन. आरंभी याच्यावर छप्पर नसे. पीठ : जोते
उपपीठ :पीठावर येणारे, कमी उंचीचे जोते किंवा चौथरा.
कपोत: सज्जा किंवा पागोळी .
कोष्ठ: कोनाडा
गजपृष्ठ: चापाकार वास्तूचे छप्पर.
जंधा: देवालयाच्या भिंतीचा मधला भाग.हा सहसा सपाट असून यावर मूर्तिकाम केलेले आढळते.
तरंगहस्त: bracket.
प्रणाल: पन्हाळ.
भद्र: कोणत्याही इमारतीच्या प्रवेशद्वारासमोर बांधण्यात येणारा उघडा मंडप.
भूमी: मजला.
मंडप: आयताकार दालन. विशेषत: गाभाऱ्य़ासमोरील.
रथ: गाभाऱ्याच्या बाहेरच्या भिंतीवर असणारे उभे पट्टे. हे एकापुढे एक सरकतात. या रथांच्या संख्येवरून विधानाला त्रिरथ, पंचरथ अशी नावे देतात.
वितान: छत.
विमान: गाभारा व शिखर यांना मिळून दिलेले नाव.
वेदिका: कठडा.
व्याल: सिंह, वाघ, हत्ती अशा निरनिराळ्या प्राण्यांचे अवयव जोडून केलेला प्राणी.शरीर मुख्यत्वे सिंहाचे असते.
शाला: आयताकार विधानाची इमारत.
शिखर: छप्पर. यात कळसाचाही समावेश होतो.
शुकनास: "अंतराळ" य़ा भागावर येणारे गोलाकर छप्पर. याच्या लहान बाजूंपैकी एक शिखराला चिकटलेली असते तर दुसरीत कोनाडा करून देवमूर्ती बसवतात.
हस्त: क्षिप्त भाग. Bracket सारखा बाहेर आलेला भाग
काही इन्ग्रजी शब्दही बघू.
Apsidal : चापकार विधानाची वास्तू.
Arc : कमान
Barrel vaulted roof : गजपृष्टाकार छप्पर.
Brace: कर्ण
Bracket : हस्त
Capital : स्तंबशीर्ष, मथळा
Ceiling : छत, वितान
Column : खांब
Facade : गृहमुख
Frieze : शिल्पपट्ट
Medallion: तबक
Monolithic : एकपाषाणी
Motif : रूपक
Pilaster : अर्धस्तंभ
Plan : पदविन्यास,विधान
Recess : प्रतिक्षेप
Relief : उठाव
सुरुवातीची भारतीय मंदिरे
मंदिर स्थापत्याचा दक्षिण आशिया आणि आग्नेय आशियातील प्रवास बघायचा असेल तर भारतातील प्राचीन काळातील मंदिरांचा आढावा घेणे गरजेचे आहे. भारतात इसवी सन पूर्व तिसऱ्या शतकापासून दगडात कोरलेल्या प्राचीन लेणी आढळतात. परंतु भारतातील मंदिर स्थापत्याचा विचार करताना अनेकदा प्रसिद्ध गुप्त घराण्यातील राजांच्या काळात म्हणजे इसवी सन चौथ्या, पाचव्या शतकात (सुमारे १५०० वर्षांपूर्वी) निर्माण झालेल्या मंदिरांपासून सुरुवात केली जाते. कारण या काळातील दगड आणि विटांनी बांधलेली मंदिरे अजूनही देवगड, सांची, भितरगाव इत्यादी ठिकाणी उभी असलेली आढळतात. परंतु गुप्त घराण्यातील राजांपूर्वीच्या काळातील शिलालेखांतून, शिल्पांतून, साहित्यातील उल्लेखांतून आणि भारतातील काही उत्खननांत सापडलेल्या पुरातत्त्वीय पुराव्यांवरून इसवी सन पूर्व दुसऱ्या शतकापासूनचे (सुमारे बावीसशे वर्षांपूर्वीचे) मंदिरांचे अस्तित्व, त्यांचा आकार, तलविन्यास (प्लॅन) लक्षात येतो.

राजस्थानातील चितोडपासून जवळ असलेल्या घोसुंडी या गावातील विहिरीत सापडलेल्या इ.स. पूर्व दुसऱ्या शतकातील एका शिलालेखात संकर्षण आणि वासुदेव या देवतांच्या पूजनाकरिता ‘पूजा शिला प्राकार’ निर्माण केला गेला होता आणि त्याला ‘नारायणवाटिका’ असे नाव होते हा उल्लेख केला आहे. येथून जवळच असलेल्या नागरी या गावातील हाथी बाडा या जागेत अकबराने चितोडवर स्वारी करताना हत्ती बांधले होते, त्यामुळे त्याला हाथी बाडा असे नाव पडले. या जागेला असणारी भिंत ही मोठय़ा शिळांनी बनवलेली आहे. या भिंतीच्या दक्षिणेच्या बाजूच्या एका दगडावर एक लेख सापडला होता, जो घोसुंडी येथे सापडलेल्या लेखाशी मिळताजुळता होता. त्यावरून डॉ. भांडारकर यांनी हाथी बाडा म्हणजेच नारायण वाटिका असावी आणि ही हाथी बाडाची भिंत मूळच्या नारायण वाटिकेची भिंत असावी असा निष्कर्ष मांडला होता. तिथे झालेल्या उत्खननात एकात एक दोन लंबवर्तुळाकार भिंती असलेली स्थापत्य रचना आढळली होती. यातील आतली लंबवर्तुळाकार वास्तू म्हणजे मुख्य गाभारा सुमारे १० मीटर लांब आणि ३.५ मीटर रुंद तर बाहेरील लंबवर्तुळाकार वास्तू म्हणजे बाहेरील भिंत ही १४ मीटर लांब होती. या दोन्ही वास्तूंच्या मध्ये १.८ मीटर रुंदीची जागा होती, जी प्रदक्षिणा पथ म्हणून वापरली जात असावी. लाकूड आणि माती वापरून हे मंदिर बांधण्यात आलेले होते. या मंदिराचा काळ इ.स. पूर्व तिसरे शतक असावा असा संशोधकांचा तर्क आहे. याच मंदिरात शिलालेखात नमूद केलेली संकर्षण आणि वासुदेवाची पूजा केली जात असावी.
मध्य प्रदेशातील विदिशा येथे खांब बाबा नावाने ओळखला जाणारा स्तंभ हा इ.स. पूर्व दुसऱ्या शतकात ग्रीक राजा अँटिअल्कायडस याच्यातर्फे तक्षशिलेहून काशीपुत्र भागभद्र राजाकडे आलेला ग्रीक दूत हेलिओडोरस याने उभारलेला आहे. या हेलिओडोरसने हा गरुडध्वज वासुदेवासाठी म्हणजे वासुदेवाच्या मंदिरासमोर उभारला असावा. त्या शिलालेखात हेलिओडोरसचा उल्लेख भागवत असा केला आहे. म्हणजे तो वैष्णव होता.
याशिवाय याच परिसरात अजून एका स्तंभाचा तुकडा सापडला- ज्यावरदेखील शिलालेख कोरलेला होता. या खांबाच्या तुकडय़ावरील खंडित शिलालेखानुसार तो स्तंभ ‘भगवंताच्या उत्तम प्रासादाचा गरुडध्वज’ होता. म्हणजे हेलिओडोरसच्या गरुडध्वजाखेरीज इतरांनीही त्या परिसरात गरुडध्वज उभारले होते आणि हा वासुदेवाचा उत्तम प्रासाद असल्याने कदाचित हेलिओडोरसने, जो स्वत:ला भागवत म्हणवून घेतो, त्याने अजून एक गरुडध्वज त्या मंदिराच्या परिसरात उभारला असावा.
डॉ. भांडारकर यांना हेलिओडोरसने उभारलेल्या स्तंभाच्या आसपासच्या भागात केलेल्या उत्खननात एका मंदिराचे अवशेष सापडले होते. त्यावरून तेथे लंबगोलाकार गाभारा आणि त्यात प्रवेश करण्यासाठी चत्यकमान असलेले प्रवेशद्वार होते हे लक्षात येते. याशिवाय या मंदिराभोवती दगडी वेदिकादेखील होती. सर्वात महत्त्वाचे म्हणजे येथील मंदिराला शिलालेखात प्रासाद म्हणून संबोधले आहे.
गुडीमल्लम (चित्तूर जिल्हा, आंध्र प्रदेश) येथील परशुरामेश्वर मंदिरात असलेले सुमारे पाच फूट उंचीचे प्राचीन शिविलग इ.स. पूर्व दुसऱ्या शतकातील असल्याचे संशोधकांचे मत आहे. या शिविलगाच्या पुढील बाजूस शिवमूर्ती अर्धउठावात कोरली आहे. या शिविलगाच्या चारी बाजूने सव्वा मीटर लांबीरुंदीची वेदिका (कठडा) उभारलेली होती, जी अजूनही दृष्टीस पडते. प्राचीन काळी हे शिविलग या वेदिकेमध्ये कोणत्याही मंदिराशिवाय होते. कालांतराने इ.स. पहिल्या ते तिसऱ्या शतकात शिविलग आणि वेदिकेच्या बाजूने त्यावर चापाकार apsidal) मंदिर उभारले गेले, तर मध्ययुगात या मंदिराच्या प्रदक्षिणापथावर खांबांनी युक्त बांधकाम करण्यात आले. या आधीच्या लेखात बघितल्याप्रमाणे, गर्भगृह आणि तेथील मूर्ती हा मंदिराचा गाभा असल्याने त्यात बदल केले जात नाहीत. त्याप्रमाणे येथेही मूळचे बावीसशे वर्षांपूर्वीचे शिविलग आणि त्याभोवतीची वेदिका तशीच ठेवून त्याभोवती मंदिर उभारण्यात आले.
सोंख (मथुरा) येथे उत्खननात सापडलेल्या एका चापाकार apsidal’) मंदिर हे वस्ती आणि आजूबाजूच्या रस्त्यांच्या मध्यभागी होते. पूर्व-पश्चिम असलेले हे मंदिर मूळचे छोटेखानी होते आणि नंतर त्याचा विस्तार करण्यात आला. या मंदिराचा मूळ गाभारा ३ मीटर लांबीरुंदीचा चौकोनी गाभारा होता. त्याचे रूपांतर नंतर चापाकार गाभाऱ्यात झाले. सोंख येथील या मंदिराचा काळ संशोधकांच्या मते इ.स. पहिले ते दुसरे शतक असावा. या काळात नऊ टप्प्यात या मंदिराचा विस्तार करण्यात आला. येथीलच दुसऱ्या एका चापाकार गाभाऱ्याचे मंदिर एका उंच जोत्यावर बांधलेले असून, त्या मंदिराच्या आवारात काही खोल्यादेखील होत्या. या मंदिराच्या आवाराला नक्षीकाम केलेली दगडी वेदिका (कठडा) होती. तसेच दगडी स्तंभ आणि तोरण असलेले प्रवेशद्वारही होते. हे तोरण असलेले प्रवेशद्वार सांची येथील स्तूपाच्या प्रवेशद्वारासारखे होते. येथे सापडलेल्या मूर्तीवरून तसेच या प्रवेशद्वारावरील नाग आणि नागी यांच्या शिल्पांवरून सोंख येथील हे मंदिर नागाचे मंदिर असावे.
आंध्र प्रदेशातील नागार्जुनकोंडा (प्राचीन विजयपुरी) येथील उत्खननात सापडलेल्या पुराव्यांवरून आणि इक्ष्वाकु राजांच्या दानलेखांतून लक्षात येते की येथे एकोणीस मंदिरे होती. यातील काही मंदिरांच्या दानलेखांतून राजाचे नाव येत असल्याने त्यांचा इ.स. तिसरे ते इ.स. चौथे शतक हा काळ ठरविणे शक्य होतेच, परंतु ती मंदिरे कुठल्या देवतेची होती हेदेखील लक्षात येते. उत्खननात या मंदिरांचा पाया सापडला आहे. यातील सर्व मंदिरे एकसारखी होती असे मात्र नाही. काही मंदिरे लंबवर्तुळाकार आकाराच्या गाभाऱ्याची होती, तर काही चापाकार आकाराच्या गाभाऱ्याची.
यातील पाच मंदिरे शिव आणि कार्तिकेयाची होती. इक्ष्वाकु राजा एहुवल याचा सेनापती एलिसिरी याने उभारलेल्या सर्वदेव मंदिराला शिलालेखात या मंदिराला ‘मंडप प्रासाद’ असे संबोधले आहे. हे सर्वदेव मंदिर म्हणजे कदाचित अनेक देवांचे मंदिर असावे.
इक्ष्वाकु राजा एहुवल चंटमुल याच्या राजपुत्राने एक शिव मंदिर उभारले होते. या शिव मंदिराचा गाभारा चापाकार (apsidal) होता. या गाभाऱ्याच्या समोर थोडय़ा अंतरावर एक मंडप होता, त्यापुढे ध्वजस्तंभ होता आणि या सर्वाभोवती प्राकार (भिंत) होता. याच राजाच्या काळात बांधल्या गेलेल्या दुसऱ्या एका मंदिराचा गाभारा लंबवर्तुळाकार होता आणि त्यासमोर मंडप उभारलेला होता. नागार्जुनकोंडा येथेच सापडलेल्या एका कार्तिकेयाच्या मंदिराचा गाभारा चौकोनी होता. तेथे कार्तिकेयाची एक खंडित मूर्तीदेखील सापडली होती.
वरील सुरुवातीच्या मंदिरांच्या पुराव्यांवरून लक्षात येते की सुरुवातीला यक्ष, नाग यांच्या मूर्तीची पूजा ज्याप्रमाणे उघडय़ावर केली जात असेल, त्याचप्रमाणे शिव, विष्णू यांच्या
प्रतिमांचे पूजन खुल्या आकाशाखाली केले जात असेल. परंतु त्या मूर्तीभोवती वेदिका (कठडा) उभारून त्या मूर्तीभोवतीची पवित्र जागा अधोरेखित केली जात असे. कालांतराने त्यावर लाकडी छत उभारून अथवा लाकूड, मातीच्या भिंती करून त्या मूर्ती असलेल्या त्या पवित्र जागेचे रूपांतर कुटीवजा देवगृहात करण्यात आले.
कालांतराने या देवगृहाच्या लाकडी रचनेचे रूपांतर विटा आणि दगड वापरून केलेल्या देवगृहात झाले, जी दीर्घकाळ टिकू शकत होती. याच छोटय़ा चौकोनी किंवा लंबवर्तुळाकार गाभाऱ्याच्या बाजूने प्रदक्षिणापथ आणि समोरील जागेत अंतराळ, मंडप, मुखमंडप, इत्यादी स्थापत्य रचना निर्माण करून त्याला मंदिराचे सुधारित स्वरूप मिळाले. गाभाऱ्यावर विशेषत: चौकोनी आकाराच्या गाभाऱ्यावर अनेक मजली शिखर बांधले जाऊन त्याला प्रासादाचे स्वरूप देण्यात आले.
मंदिराची अंगे किंवा भाग
एकीकडे काळानुसार मंदिराची आंतरबाह्य रचना बदलत होती, तर दुसरीकडे मुर्तीच्या संबंधीही अध्यात्माच्या आणि तत्वज्ञानाच्या अंगाने विचार होत होता. मंदिरांची तुलना मानवी देहाशी केली जाऊ लागली. मंदिराच्या विविध अंगाना नावे देण्यात आली, त्यामुळे मानवाच्या देहाप्रमाणे मंदिरांचे सुध्दा भाग निर्माण झाले. मानवाचा गर्भ म्हणजे मंदिराचा गाभारा. जसा गर्भात मानवाचा आत्मा असतो तसा गाभार्यात सृष्टीच्या आत्म्याचा सहवास असतो. "यथा देह तथा देव', असे मानले जाऊ लागले. मंदिर म्हणजे केवळ दगड विटांची एक इमारत न राहता हिंदु तत्वज्ञानाला आकार आणणारी वास्तू असे तिचे स्वरुप झाले. मनुष्य देह आणि देवळाचे भाग यांच्यात साम्य दाखवण्यात आले. उदा. केस म्हणजे कळस, आमलक म्हणजे डोके, मान म्हणजे ग्रीवा असे वर्णन अग्निपुराणात मंदिराबद्दल करण्यात आले आहे.

मंदिरात पावित्र्य आणि भक्तीचे वास्तव्य असल्यामुळे त्याच्या प्रत्येक भागाला अर्थ असतो. त्यामागे एक उद्देश असतो.जिथे देव प्रतिष्ठीत होतो त्याला गाभारा म्हणतात. गाभार्या शिवाय देऊळ असू शकत नाही. त्यानंतर येतो तो सभामंडप. सभामंडप ही एक प्रशस्त जागा असते. जिथे भक्तगण थांबू शकतात, शांत चित्ताने बसू शकतात. या सभामंडपाला किती दरवाजे असावेत हे त्याच्या व्याप्तीवर अवलंबून असते. सभामंडप आणि गाभार्या मध्ये असणार्या जागेला अंतराळ म्हणतात. सभामंडपाच्या समोर एक छोटा मंडप असतो याला मुखमंडप म्हणतात. सभामंडपात मधोमध असेणार्या चार खांबांमध्ये जमिनीवर एक उंचवटा असतो त्याला रंगशिला म्हणतात. देवाची उपासना कलेच्या माध्यमातून करावी आणि ती सादर करण्याची जागा म्हणज "रंगशिला'. सभामंडपाच्या छताचे सुध्दा भागांनुसार प्रकार पडतात. या सभामंडपाला असणार्या खिडक्यांना "जालवातायने" असे म्हणतात. संपूर्ण मंदिराच्या बाहेर असणार्या जागेला प्राकार म्हणतात.
 |
| नागर मंदिर बाह्यांगे |
अधिष्ठान :- मंदिर ज्या ओट्यावर उभे असते त्याला अधिष्ठान, पीठ किंवा जगती म्हणतात. मंदिरांचे अधिष्ठान हे चौकोनी, आयताकृती, वर्तुळाकार, लंबवर्तुळाकार किंवा अष्टकोनी असते. अधिष्ठानाचे महत्व फार असते. एक तर मंदिर त्यामुळे जमिनीपासून उंचावर दिसते, पावसाच्या पाण्यापासून बचाव होतो, प्रदक्षिणा मार्गासाठी जागा मिळते, तसेच हत्ती, घोडे वगैरेंचा शिल्पपट कोरून मंदिराची सुंदरता अजून वाढवता येते. इमारतीच्या मजबूतीसाठी जोते पाहिजेच. शिवाय ते जमीनीपासून उंचही पाहिजे. तेवढेही पुरेसे वाटले नाही तर त्याच्यावर उपपीठ किंवा चौथरा. उपपीठपीठ ,जोते. उपपीठ ,दुय्यम जोते.म्हणजे जोत्यावरील उंचीने व आकाराने लहान असलेले जोते.पीठ/उपपीठ जर प्रशस्त असेल तर देवळाभोवती प्रदक्षीणेला जागा मिळते. पाया मजबूत असला की इमारतीला मजबूती मिळते हे झालेच पण पावसाळ्यात साचलेल्या पाण्यापासून बचाव व मंदिर लांबवरून दिसते हेही महत्वाचे फ़ायदे..
निरनिराळ्या कालखंडातील पीठाची छायाचित्रे देत आहे.
पीठ १ पीठ दिसते पण सजावट नाही.

पीठ २

उपपीठ
उपपीठ लहान आहे पण सजवले आहे. आपणास याहून उंच उपपीठे (छान सजवलेली) पहावयास मीळतील.
अर्धमंडप/अर्धस्तंभ
अर्धमंडप हा आकाराने लहान (निम्मा) मंडपच. जमा झालेल्या माणसांना बसण्यास जागा पाहिजेच.मंडपाला भर (Suppliment) म्हणून अर्धमंडप. आजही देवळात लग्ने लागतात. दक्षिणेत त्याला "कल्याणमंडप" म्हणतात.
अर्धस्तंभ हा हल्लीच्या भिंतीतील column प्रमाणे अर्धवट दिसणारा. तो मोकळा असेल तर पूर्ण दिसतो, भिंतीत गाडला गेला तर अर्धा.
रथ.
सपाट भिंतीपेक्षा मागेपुढे झालेली भिंत सुशोभित दिसते. यातील पुढे आलेल्या भागाला रथ म्हणतात. उभी पट्टी म्हणा ना. चित्रात रथ व आमलक दाखविले आहेत.


मंडोवर :-
मंदिराची बाह्यभिंत. गाभारा तसेच बाहेरील विविध मंडप यांच्या बाह्य भिंतीला मंडोवर किंवा मसूरक म्हणतात. खोली बंदिस्त करणे ही महत्वाची गोष्ट. पण आणखी दोन उपयोग म्हणजे सुशोभन आणि छपराला आधार देणे. या भिंती इतक्या मजबूत असतात कि त्या प्रचंड मोठ्या छताला आधार देऊ शकतील त्याच सोबत त्या इतक्या अलंकृत असू शकतात कि पाहणाऱ्याला भिंतीचा मूळ उद्देश छताला आधार देण्याचा आहे हेच विसरायला होईल. या भिंतींवर देव दैवतांची अनेक रूपांतील शिल्पे तसेच मानवाकृती शिल्पांच्या पट्टीका असतात, त्यांना जंघा म्हणतात. या जंघांवर मंदिराच्या मूळ देवतेची रूपे तसेच देवतेच्या परिवारातील इतर देवतांची शिल्पे, विचिध विभ्रमांतील नर तसेच स्त्री प्रतिमा असतात. काही मंदिरांच्या मंडोवरावर इतक्या मूर्ती असतात कि भिंतीचा इंचभरचा भागही दिसत नाही. एक जंघा पट्टीका कमी पडते कि काय म्हणून काही मंदिरांचे स्थपती दोन किंवा तीन तीनही जंघा मंडोवरावर वसवतात. जसे अंबरनाथच्या मंदिराचे मंडोवर हे एकजंघा मंडोवर आहे कारण मंदिरावर एकाच जंघा पट्टीका आहे, मात्र खिद्रापूरच्या मंदिरात तसेच औंढा नागनाथ मंदिरात द्विजंघा मंडोवर आढळते आणि मार्कंडी येथील मार्कंडेश्वर मंदिरात तसेच खजुराहोच्या मंदिरांचे मंडोवर तर त्रिजंघा युक्त आहेत.
तिगवाच्या देवळाच्या भिंती साध्या आहेत. छपराला आधार देणे हे महत्वाचे काम. पण पुढे सुशोभन एवढे महत्वाचे झाले की हळेबिड-बेलूर येथील देवळांच्या भिंती दिसतच नाहित. दिसतात मूर्ती, मूर्ती आणि परत मूर्तीच. हां,भिंती छपराला आधार देतात, पण जणू नाइलाजाने. अंगभर दागिने घालून,रेशमी शालू नेसून, सुहास्य वदनाने पाहुण्यांचे स्वागत करणाऱ्या वधूमातेने थोडा वेळ नवर्याबरोबर कन्यादानाला बसावे तसे! लक्षात राहते ती पहिली प्रतिमा, दुसरी नव्हे. खरे म्हणजे या भिंती चांगल्या जाडजूड असतात. मोठे वजन पेलण्याकरताच त्यांची योजना असते. शिवाय सुरवातीच्या गिरिशिल्पात, थोडक्यात गुहेत, गेल्यावर जसे गार व काळोखलेले वाटेल तसे वाटावे हीही एक मनोकामना होती.( प्राग-ऐतिहासिक काळात उघड्यापेक्षा गुहेत माणसाला जास्त सुरक्षित वाटत असावे. त्याचा तर हा परिणाम नाही ना?) . माणूस नवे निर्माण करतांना " जूने जाऊ द्या मरणालागूनी" असे फ़ार वेळी म्हणत नाही. मागच्यातले चांगले घेऊन त्यात भर घातली जाते. मग ते शास्त्र असो, कला असो, सामाजिक नीतीनियम असोत. अजूनही घरातील देवघर भगभगित उजेडात नसते व तेथे विजेच्या दिव्यापेक्षा समई-पणती जास्त बरी वाटते. असो. या भिंतीना आतील व विशेषत: बाहेरच्या बाजूंनी नटवतांना निरनिराळ्या पद्धती वापरण्यात येतात. रथ, थर, देवादिकांच्या मूर्ती, रामायण-महाभारतातील कथा, रुपके, फ़ुले-वेली, मिथूने, जे जे कलाकाराला योग्य वाटेल, त्याचा उपयोग केला गेला आहे. नंतरच्या काळात या भिंती शक्यतो एका सरळ रेषेत येत नाहीत ना इकडे लक्ष दिले गेले. बघणाऱ्याची नजर सावकाशपणे फ़िरेल, त्याला छायाप्रकाशाचा खेळ बघावयाला वेळ मिळेल याची काळजी घेतली गेली. काही छायाचित्रे पहा.

रथ. भिंतीतून पुढे आलेले खांब. काही वेळा यांत व मूर्तींमध्ये भिंतच सापडत नाही.
छप्पर :
हा इमारतीचा भाग केवळ शिल्पीच्या आवाक्यातला नव्हता. आता गरज होती वास्तूशास्त्रज्ञाची. (Architect & Engineer). खऱ्या अडचणींना इथे सुरवात झाली. हा महत्वाचा भाग अनेक शैलींमुळेही जास्त जागा घेणारा आहे.
वेदिबंध :- अधिष्ठान आणि मंडोवरच्या मधील भागाला वेदिबंध म्हणतात. हे वेदिबंध अनेक आडव्या थरांनी बनलेले असते जसे सर्वांत खाली तळात खूर, कीर्तिमुखथर, गजथर, अश्वथर, पुष्पथर इत्यादी.
सुरसुंदरी:- सुरसुंदरी म्हणजे देवांगना. सुरसुंदरी म्हणजे अप्सरा वा पर्या असाही समज आहे. मंदिराच्या बाह्य तसेच आतल्या भितींवर तसेच खांबांवर विविध विभ्रमांतील स्त्री प्रतिमा असतात. असतात त्या अगदी अप्सराच पण त्यांना सुरसुंदरी म्हणतात.समुद्रमंथनातून त्या बाहेर आल्या असाही अनेकांचा समज आहे. या सुरसुंदरीचा मंदिराच्या भिंतीवर असण्याचा उद्देश काय ? प्रयोजन काय ? हे समजणे महत्वाचे आहे.. शब्द, स्पर्श, रुप, रस व गंध हे ५ विषय एकएकटे सुध्दा मारक असतात.. मानवाला तर या ५ विषयांनी पूर्णपणे ग्रासल आहे. मग त्यांची स्थिती कशी होईल. भक्तगणांनी मंदिरात जातांना कसे सावध चित्त असावे, या संबंधीचे सूचन करणार्या सुरसुंदरी आहेत. शिवाय, काही जणी देवाच्या दर्शनाला जातांना देवाला काय अर्पण करावे,देव दर्शनाला कसे जायचे असते इत्यादिंचे मार्गदर्शन करतात.रिक्तहस्ते देवाला जायचे नसते. पान,फळ, फुल इ. काहीच जवळ नसतांना केवळ पाणी सुध्दा मनोभावे देवाला अर्पण केले तरी चालते. गीतेत याविषयी छान श्लोक आहे.
पत्र वा पुष्प जो प्रेमे फळ वा जळ दे मज ।
ते त्या पवित्र भक्तांचे अर्पिले खाए मी सुखे।।
डालमलिका, पद्मगंधा, जया इत्यादी सुरसुंदरी हेच सुचवित असतात.. या सुरसुंदरी देखण्या तर असाव्या लागतात परंतु त्यांच्यात मानवी भावभावना आणि कार्यमग्नता सुध्दा असावी लागते. मध्ययुगीन मंदिरावर मोठ्या प्रमाणात सुरसुंदरीची शिल्पे कोरण्यात आली आहेत. यामागचे मुख्य कारण म्हणजे भक्तिसंप्रदायाची असणारी त्या काळातील लोकप्रियता. देवालय ही त्या गावांतील सांस्कृतिक केंद्र होती. भक्तजनांमध्ये नितीमूल्य निर्माण करण्याची महत्वाची जबाबदारी त्यांच्याकडे होती. नृत्यांगना, वादनमग्न सुरसुंदरी देवतांचे मनोरंजन करणार. अप्सरा भक्तांना मंदिराकडे आकर्षित करणार. आपल्या लक्षणांनी गुणांनी सुरसुंदरी भक्तांना इच्छा, वासना, मोह, विकार यापासून परावृत्त करणार आणि त्यानेच भक्तांचा उध्दार होईल. मंदिरावर गळ्यात लहानस, डमरुसारख वाद्य अडकवून ताल धरणार्या सुरसुंदरीस मर्दला असे म्हणतात. उर्वशी, मेनका, तिलोत्तमा या बहुदा प्रतापाची जाणीव करुन देण्यासाठी कोरलेल्या असाव्यात. सुरसुंदरी ज्या भावभावना, गुणधर्म वा हेतु प्रकट करतात. ते सर्वच ठिकाणी आढळत असेल तरी कलेच्या दृष्टिकोनातून त्यांच्या प्रकटीकरणात वेगळेपण असेल्याचे जाणवते. अनेक ठिकाणच्या मंदिराच्या गाभार्याच्या प्रवेशद्वारापाशी २ सरीतांची शिल्पे कोरलेली असतात. ती गंगा आणि यमुना यांची होत. त्यांच्या हातात जलकुंभ दाखविलेला असतो. तर पायाशी क्रमाने मकर व कासव कोरलेले असेत.शिल्पशास्त्रात १६ तर क्षीरवर्णात बत्तीस सुरसुंदरींचे वर्णन आलेले आहे. त्यापैकी काही सुरसुंदरी अश्या;
१. दर्पणा :- आरशात स्वतःला पाहणारी, भक्तांनी मंदिरात शिरण्यापूर्वी आपल्या अंतर्मनात पाहून असलेले सगळे विकार काढून टाकले पाहिजेत असे सांगणारी. दर्पणा हि सुरसुंदरी आरशात पहाते.याचे कारण समर्थ रामदास स्वामींनी सांगितल्याप्रमाणे 'आपण आपणासी पहावे हे प्रयोजन' म्हणजे मंदिरात जाण्याचा आपला हेतु फक्त स्वतःला माहिती असतो, इतरांना नाही याची जाणीव असावी हाच या मागचा हेतु.
२. पुत्रवल्लभा :- देव भक्तांचे अगदी स्वतःच्या बाळाप्रमाणेच लाड करतो हे सांगणारी. हिच्या कडेवर मुल असते. म्हणजे ज्याप्रमाणे आई आणि मुल यांचे नाते संत नामदेवांनी अभंगात सांगितल्याप्रमाणे ' तु माझी माउली, मी तुझे लेकरु.नको दुरी धरु विठाबाई'. असे सांगितल्याप्रमाणे देव आणि भक्त यांचे नाते असते. आणखी एक सुरसुंदरी म्हणजे पत्रलेखिका. विरहव्याकुळ भक्ताचे हे चित्रण आहे.
३. शुभ गामिनी :- पायात रुतलेला काटा काढत असतांना. भक्तीच्या मार्गात येणारे अनेक अडथळे खऱ्या भक्ताने असेच दूर करून भक्तीच्या मार्गावर चालत राहावे हे सांगणारी.
४. शत्रू मर्दिनी :- हिच्या एका हातात तलवार आणि दुसऱ्या हातात शत्रूचे मुंडके असते.
५. शुकसारिका :- एका हातावर शुक म्हणजेच पोपट बसवून दुसऱ्या हाताने त्याला खाऊ घालतांना हिला शिल्पित केले जाते. देव आपल्या भक्तांच्या पोटाचा प्रश्न स्वतःच सोडवतो हे सांगणायचा प्रयत्न असेल का हीचा ?
६. डालमालिका / शालभंजिका :- झाडाची डहाळी / फांदी धरून उभी असलेली. असे म्हणतात कि मंदिरातील देवतेचे दर्शन घेण्याआधी मंदिराला बाहेरून प्रदक्षिणा मारावी, त्याने मंदिर कोणत्या देवाचे आहे तेही कळते आणि मंदिरात जाण्याआधी भक्ताने आपल्या मनाची तयारी कशी करावी हेही कळते. या सुरसुंदरी अस्ण्याची काही कारणे सांगितली जातात. ज्याप्रमाणे डालमालिका, जया,पद्मगंधा या आपणास मंदीरात कसे जावे हे सांगत असतात.देव्,गुरु आणि मान्यवर यांच्याकडे रिक्तहस्ते जाउ नये असा संकेत आहे.पत्र,फळ्,पुष्प, तोय घेउन जावे असे भगवदगीता सांगते. येथे डालमालिकेच्या हाती झाडाचे पान, जयेच्या हाती पाण्याचा कुंभ, पद्मगंधेच्या हाती फुल दिसते. आणि आपणास या संकेताची आठवण करुन दिली जाते.
७. पत्रलेखिका :- अतिशय सुंदरपणे आपले विभ्रम दाखवत उजव्या हाताच्या अंगठा आणि तर्जनी मध्ये बोरू धरून कागदावर पत्र लिहीत असते.
८. स्त्री आणि माकड :- पूर्णपणे सालंकृत होऊन घराबाहेर पडलेल्या ह्या सुंदरीच्या एक किंवा दोहोबाजूने माकडे तिचा कधी मेखला ओढत तर कधी पदर खेचत छळ करत असतात आणि सुंदरीही हाताच्या फटकाऱ्याने त्यांना दूर करण्याच्या आवेशात असते. इथे माकड हे आपल्याच चंचल मनाचे प्रतिक आहे. तेव्हा मंदीरात जाताना आपले मन ताब्यात ठेवले पाहिजे हे सांगितले आहे.
९. नर्तकी :- नृत्य मुद्रेतली सुंदरी
१०. मर्दला :- ढोलकी वाजवत असलेली सुंदरी
या आणि अश्या अनेक स्वरूपातील शिल्पे मंदिराचे बाह्यांग आणि अंतरंग सजवत असतात.
 |
| सुरसुंदरी |
गर्भगृह आणि त्याचे प्रवेशद्वार :- वरती म्हटल्याप्रमाणेच मंदिरांचे निर्माणच मुळी देवतेच्या स्थापनेसाठी झाले, त्यामुळे, सर्वात आधीच्या मंदिरापासून ते आजच्या मंदिरांपर्यंत सगळ्याच मंदिरांत जी एक सामायिक गोष्ट सापडते ती म्हणजे गाभारा किंवा गर्भगृह. तेव्हापासून आतापर्यंत आणि कोणत्याही प्रकारच्या मंदिरात गाभारा असतोही लहानसाच. मंदिराचे स्थपती सहाव्या शतकातल्या मंदिरांतही गाभाऱ्याच्या प्रवेशद्वाराला सालंकृत करत होते. जसा जसा काळ पुढे सरकत गेला गर्भगृहाच्या द्वारपट्टीका अजून अजून सुंदर बनत गेल्या. द्वारशाखा म्हणजे प्रवेश करावयाची जागा.कडी-कोयंडा-कुलुप लावून बंद करावयाचा घराचा दरवाजा नव्हे. बऱ्याच ठिकाणी बंद करावयाचा दरवाजा नसतोच. द्वारशाखा समोरून तसेच बाजूंनीही असातात. चौकट एक असते किंवा अनेक. काही वेळा चौकट नसतेही. दोन बाजूंच्या भिंतीच ते काम करतात. चौकट (किंवा चौकटी) करावयास व सुशोभनास सोप्या. दोनही बाजूला गंगा-यमुना किंवा द्वारपाल उभे केले की एकदम उठाव येतो. रुंदी व उंची आटोपशीर असल्याने नाजूक कोरीव कामास आदर्श. नीट निरीक्षण केल्यास गाभाऱ्याच्या दरवाजात लहान लहान द्वारशाखा बनवून त्यावर फुले पाने, व्याल, गज, स्तंभ, गंधर्व तसेच मिथुन शिल्पे कोरलेली आढळतात. काही मंदिरामध्ये तर या द्वारशाखेचे नऊ नऊ थरही आहेत. तसेच या द्वारशाखांच्या तळाशी दोन्ही बाजूला द्वारपाल आणि गंगा तसेच यमुना यांची शिल्पे असतात. गर्भगृह प्रवेशद्वाराच्यावरच्या पट्टिकेला ललाटपट्टी आणि त्याच्या मध्यभागाला ललाटबिंदू म्हणतात. या ललाटबिंदूंमधे मंदिराच्या मुख्य देवतेचे शिल्प असते मात्र ११व्या शतकानंतर ललाटबिंदूंमधे गणेशाला स्थान मिळाले मग मंदिर कोणत्याही देवतेचे असले तरीही.
देवळात प्रवेश करण्या आधीच तुमचे मन उल्हसित होऊन जाते. या पुढे जेंव्हा कुठल्याही देवळाला भेट द्याल तेंव्हा दारापाशी थांबा.दोन्ही बाजूचे द्वारपाल बघा. चौकट एक आहे की अनेक आहेत, त्यांवर वेल-पताकांचे न्क्षीकाम आहे की लहान मूर्ती आहेत, वरपर्यंत एकच थर आहे की अनेक, अनेक असतील तर त्यांत काही योजना दिसते का, वरची गणेशपट्टी दरवाजाच्या किती बाहेर गेली आहे, त्यावरील कोरीव काम कसे आहे, वर कीर्तिमुख वगैरे काय काय आहे हे सर्व बघून मगच आत पाऊल टाका.
गर्भगृह प्रवेशद्वार
येथे काही द्वारशाखांची छायाचित्रे देत आहे. ती एका कालखंडातील नसली तरी सुरवातीपासून दरवाजे कसे नटवले जात याची कल्पना येईल.

मकरतोरणांकित, पण फार सजावट नाही. पापनाथ मंदिर

सजावट वाढली.

कडेला मूर्ती आल्या. वरची पट्टीही प्रेक्षणीय
अंतराळ :- गाभारा आणि मंडप यांना जोडणारे दालन म्हणजे अंतराळ . हा लहानगाच भाग असतो आणि पूर्णपणे उघडा म्हणजे ना छत ना भिंती असा असू शकतो (जसा सुरवातीच्या काही मंदिरांत आढळतो) किंवा पूर्णपणे बंदिस्त असतो. अंतराळात साधारणपणे मंदिराच्या मुख्यदेवतेची किंवा परिवारातील इतर देवतांची शिल्प किंवा मूर्ती देवकोष्ठकांत असतात. काही मंदिरांत मात्र अंतराळ पूर्णपणे रिकामे असते.
आमलक :-
मंदिराच्या शिखरावरती गोलाकार आकाराचे दगडी चाक म्हणजे आमलक. याचे बाह्य अंग फुगीर असून परिघावर खाचा असतात. याचा आकार राय आवळ्यासारखा दिसत असल्यामुळे या आमलक म्हणतात. काही तज्ज्ञांच्या मतानुसार आमलक हा कमळाच्या आकाराचा म्हणजे मंदीरातील देवतेचे आसन म्हणून असतो, तर काही मतानुसार आमलक हा सुर्यदेवतेचे प्रतिनिधीत्व करतो, म्हणजे एक प्रकारे हे स्वर्गाचे द्वार आहे. बहुतेकवेळा आमलक मंदीराच्या शिखराच्या सर्वोच्च स्थानी असतो. पण काही मंदीराबाबत तो थोडा खाली आणि संख्येने एकापेक्षा जास्त असु शकतो. उदा, सिरपुर येथील लक्ष्मण मंदीर या विटांनी बांधलेल्या मंदीराच्या शिखराच्या चार कोपर्यात चार आमलक आहेत.
मकरप्रणाल :- मंदिराच्या गाभाऱ्यात असलेल्या मूर्तीवर पाण्याच्या आणि दुधादि द्रव्यांचा अभिषेक केला जातो, या पाण्याचा निचरा करण्यासाठी गाभाऱ्यातून एका वारिमार्गाची योजना केलेली असते. या वारिमार्गाचे मुख गाभाऱ्याच्या बाहेरच्या बाजूने असते. बाहेरच्या बाजूने मार्गाच्या तोंडाशी मगरीचे मुख किंवा गाईचे मुख असते. प्राचीन काळातल्या मंदिरांमध्ये आपल्याला येथे मकरमुख (मगरीचे मुख) दिसते कारण हे बाहेर येणारं अभिषेकाच पाणी तीर्थ म्हणून प्राशन केलं जातं आणि मगर म्हणजे गंगेचं वाहन. त्यामुळे तिथून पडणारे ते गंगाजल. मराठेकालीन मंदिरांमध्ये मात्र मगरीचे महत्व कमी झाले आणि तिथे गोमुख दिसू लागले कारण गायही पवित्र मानली जाते.
संगमेश्वर जवळील कर्णेश्वर मंदिर
गोमुख
"गो" म्हणजे गाय, तर गोमुख म्हणजे गाईचे मुख. गाईला हिंदुधर्मात महत्वाच स्थान आहे..तिला माता मानले आहे.. गोमातेचे दूध, शेण, मूत्र इत्यादी सासारेच कमालीच आरोग्यप्रद आहे.. त्यामुळे पूजाविधी करतांना पिंडीवर ओतलेले पाणी बाहेर काढतांना गोमुखातून सोडले जाते. याच्या मागची संकल्पना अशी की मुळातच देवावरून सोडलेले पाणी गोमुखातून बाहेर सोडल्यामुळे आणखीनच पवित्र आणि आरोग्यवर्धक होत. अनेक ठिकाणी गोमुखातून बाहेर सोडलेले पाणी एका छोट्याश्या कुंडामध्ये साठेवले जाते.अनेक मंदिरांमध्ये देवावरून सोडलेले पाणी वाहून जाण्यासाठी गोमुखा ऎवजी मकरशिल्प कोरलेले असते. अशा प्रकारची शिल्पे सिन्नरच्या गोंदेश्वर मंदिरात, खिद्रापूरच्या कोपेश्वर मंदिरात आहेत. यांनाच "मकरप्रणाल' असेही म्हणतात.
मकर तोरण :- मंदिराच्या प्रवेशाच्या किंवा मंदिराच्या अंतराळाच्या प्रवेशाच्या वरच्या बाजूला एक मकरतोरण असते. दोन्हीबाजूच्या मगरीच्या तोंडातून ते तोरण बाहेर पडत असते. नक्षी वेगवेगळ्या प्रकारची असू शकते कधी तिथे गंधर्व उडत जात असतानाची नक्षी असते तर कधी मोराच्या पिसाऱ्यासारखी.
 |
| मकर तोरण |
मंडप :- ज्या कारणांसाठी आधुनिक काळात मानव मंडप बांधतो त्याच कारणांसाठी मंदिरांतही मंडपाची योजना केलेली असते, काही काळ सानिध्यात बसण्यासाठी, मंदिरात अर्थातच देवाच्या सानिध्यासाठी, मंदिरात होणाऱ्या नृत्य, गायन, भजन, प्रवचनादी कार्यक्रमांत सहभागी होण्यासाठी. मंदिर कोणत्याही प्रकारचं असलं तरीही मंडप हा असतोच. नागर शैली मंदिरांमध्ये लहानच पण २ ते ३ एका मागे एक असे मंडप असू शकतात. द्राविड शैली मंदिरांत मात्र साधारणपणे एकच आणि मोठासा मंडप असतो. मंडपही दोन प्रकारचे असतात, जर मंडपाच्या दोन्ही बाजूंना भिंती नसतील किंवा फक्त कठडे असतील म्हणजेच भिंती पूर्णपणे खालपासून वरपर्यंत जाणाऱ्या नसतील तर अश्या मंडपाला रंगमंडप म्हणतात. या रंगमंडपात मध्यभागी होत असणाऱ्या नृत्य, भजन, प्रवचन वगैरे सारख्या देवाच्या सेवेला पाहण्यासाठी भक्तांना येथे संधी असते. पण जर मंडप बंदिस्त असेल तर त्याला गुढमंडप म्हणतात. जसा माणकेश्वर मंदिराचा आहे.
रंगमंडप, पाटणादेवी, चाळीसगाव महादेव मंदिर
मंदिरातील मुर्ती
जसजशी मंदिराची आंतर बाह्य रचना बदलत गेली तसतसे मुर्तीच्या बांधणीत नवनवे बदल होत गेले. मंदिरातील मुर्तीच्या स्थापनेसाठी अनेक प्रकारच्या देवतांची निवड करण्यात आली. यात प्रामुख्याने ब्रम्हा, विष्णू, महेश, गणेश, कर्तिकेय, हनुमान या प्रमुख देवतांचा तर सूर्य, दिकपाल, नवग्रह या दुय्यम देवतांचा समावेश करण्यात आला.
ब्रम्हा हा जगताचा निर्माता, उत्पतीचा जनक , ब्रम्हदेवाच्या मुर्ती फारच थोड्या मंदिरात आढळतात. त्याची चार शीरे ही चार वेदांची प्रतिके समजली जातात. याच वाहन हंस, सरस्वती ही देवी. मंदिरावर ब्रम्हदेव यज्ञ करीत असतांना सोबत मोरावर सरस्वती उभी असलेली बर्याच ठिकाणी दाखवण्यात येते.
गणेश शिव पार्वती यांचे पुत्र. मानवी शरीर व हत्तीच शीर, चतुर्हस्त हातात अंकुश, हस्तिदंत, कमळ व परशु. गजानन हे मुर्तीचे नाव वर्णन करते. तर गणपती हे नाव यक्षगणांचा अधिपती ही पार्श्वभूमी दाखवते.
विष्णूमुर्ती :- विष्णू हा "नारायण' नावानेही प्रसिध्द आहे.विष्णूचे मत्स्य, कूर्म, वराह, नृसिंह, वामन, परशुराम, राम, कृष्ण,बुध्द, कल्की हे विष्णूच दशावतार प्रसिध्द आहेत.हे दशावतार मंदिरात, मंदिरांवरील शिल्पांमध्ये पाहायला मिळतात. याशिवाय विष्णूची मुर्ती २ प्रकारात पाहायला मिळते. "केवळ विष्णू" आणि "शेषशायी विष्णू". केवळ विष्णूच्या मुर्तीमध्ये चार हातात शंख, चक्र, गदा व पद्म धारण केलेले असतात. मुर्ती साधारण पणे उभी दाखवलेली असहे. वाहन म्हणून गरुड व पायाशी श्रीदेवी व भूदेवी, उजव्या/ डाव्या हाताला लक्षी अशा मुर्ती कोरलेल्या आढळतात. शेषशायी विष्णूच्या मुर्तीत शेषावर पहुडलेल्या विष्णूच्या नाभीतून बाहेर आलेल्या कमळावर ब्रम्हदेव, पायाशी लक्ष्मी कोरलेल्या आढळतात.
शिव-महेश :- "शिव', "शंकर', "महेश' या नावान ओळखला जाणारा हा देव त्रिमुर्ती पैकी एक, त्याच्याकडे लयाला नेण्याचे काम आहे.शिव हाच सृष्टीचा निर्माता असून त्याच्या नृत्यातून सृष्टीचा अविर्भाव झाला असे ही काही पंथीय लोक मानतात. शिव हा स्मशानात राहणारा देव. अंगाला राख फासून राहणारा "योगी' हिमलयाची कन्या पार्वती हिचा पती अहे. नंदी हे त्याचे वाहन आहे. त्याशिवाय अनेक गण त्याचे सहचर आहेत. समुद्रमंथनातून निघालेले हलाहल विष त्याने प्राशन केले होते म्हणून निळकंठ अशा अनेक प्रकारे मुर्तीकारांनी त्याच्या मुर्ती निर्माण केल्या आहेत.
याशिवाय गजलक्ष्मीची मुर्ती सुध्दा काही मंदिरात आढळते. यात पद्मासनात विराजमान झालेल्या लक्ष्मीवर हत्ती पुष्पवृष्टी करतांना दाखविलेले असतात..याशिवाय काही मंदिरात हनुमंताच्या, इंद्राच्या मुर्ती सुध्दा आढळतात.
कासव
मंदिरात प्रवेशद्वाराशी कासवाचे शिल्प देवतामुर्तीकडे तोंड करुन कोरलेले असेत. यामागचे कारण असे की, कासवाचा स्वत:च्या इंद्रियांवर ताबा असतो. सर्व इंद्रियांवर ताबा असणार्या योग्याचे प्रतीक म्हणजे "कासव'.
नंदी
नंदी हा शिलाद ऋषींचा मुलगा होता. शेत नांगरत असत्तंना त्यांना हा मिळाला. नंदीने शंकराची आराधना केली आणि त्यांना प्रसन्न करुन घेतले. शंकरांनी त्याला आपले वाहान आणि त्याला आपल्या गणांचे नायकही बनविले. नंदी हा शंकराचा निस्सीम भक्त ही आहे.. तो शंकराच सर्व काम करणारा सेवकही आहे..विष्णूच्या बाबतीत गरुडाचे किंवा गणपतीच्या बाबतीत उंदराचे स्थान इतके महत्वाचे नाही पण, शंकराच्या नंदीचे स्थान अधिक महत्वाचे आहे म्हणूनच की काय शिवसहस्त्र नामांमध्ये नंदी हे शंकराचे नाव सांगितले आहे.. नंदीची, नंदीश, नंदीश्वर, नंदीकेश्वर अशी अनेक नावे आहेत. काही ठिकाणी विष्णूपुत्राचा उपद्रव नाहीसा करण्यासाठी शिवाने बैलाच रुप धारण केले आणि त्याचेच पुढे नंदी नाव रुढ झाले. त्यामुळे सहाजिकच शिवा आधी नंदीचे दर्शन व पूजन करणे भक्तांना बंधनकारक असेत.

काही ठिकाणी तर नंदीच्या दोन शिंगांमधून शिवाच दर्शन घेण्याची पध्दत आहे.. त्यामुळे प्रत्येक शिवमंदिरात शिवाच्या गाभार्यात शिरण्या आगोदर नंदी स्थापन कलेला असतो. काही मंदिरात सभामंडपाच्या अगोदर नंदीसाठी स्वतंत्र मंडप बनविलेले असतात. त्यालाच नंदीमंडप असेही म्हणतात. खूप ठिकाणी नंदीची मुर्ती पूर्णाकार स्वरुपाची असते, त्याची शिंगे आखूड टोकदार, शिंड आकारान मोठे असून पुढचा पाय जरी पायाखाली मुडपलेला असला तरी क्वचित पुढे टाकलेले असतो. त्यामुळे हा वृषभ कधीही उठून उभा राहील असे वाटते. शोके जरी एका बाजूला कललेले असले तरी दृष्टी मात्र गाभार्यातील पिंडीकडे लावलेली असते.गळ्यात किंवा पाठीवर घुंगराच्या आणि घंटांच्या माळा, पायात घुंगराच चाळ अशा अनेक अलंकारांनी नंदमुर्ती नटवलेली असते. या सार्या अलंकारापेक्षा बघणार्यावर जी छाप पडते ती त्याच्या भरदार शरीरयष्टीची. याशिवाय अनेक नंदींच्या पाठीवर शिवपिंड कोरलेली असते. उदा. नाशिकच्या सटाणा जवळ असणार्या देवळाणे या मंदिरातील मुर्ती.
शिवमंदिरात नंदी नसणारी सुध्दा काही मंदिर आहेत. यात कोल्हापूरच्या खिद्रापूर मधील कोपेश्वर मंदिराचा समावेश होतो. यामागच कारण असे की प्रजापति दक्षाच्या १६ कन्यांपैकी सतीने प्रजापतिला न जुमानता शंकराशी लग्न केले. त्यामुळे दक्षाच्या मनात शंकराला स्थान नव्हते म्हणून दक्षाने केलेल्या वाजपेय यज्ञात त्याने शंकराला आणि आपल्या कन्येलाही बोलावले नाही. शंकर मानी असेल्याने न बोलविता तो गेलाही नाही पण सतीने माहेरी जाण्याचा आग्रह धरला. म्हणून शंकराने तिला नंदीसोबत दक्षाच्या घरी पाठविले यामुळे खिद्रापूरच्या कोपेश्वर मंदिरात नंदी नाही.
घंटा - एक मंगलमय नाद
आपण जेव्हा जेंव्हा मंदिरात जातो तेंव्हा तेंव्हा आपण देवासमोर हात जोडण्यापूर्वी घंटा वाजवतो. घंटेतून येणार्या नादामुळे आपल्या मनातील ऎहिक विचारांची साखळी तुटते आणि निर्विचार मनाने आपण देवाला नमस्कार करतो. या घंटेच्या बाबतीत योगशास्त्रात बरेच उल्लेख आहेत.याबद्दलचा एक श्लोक असा आहे की,
आगमनार्थ तु देवानां गमनार्थं तु रक्षसाम्।
कुर्वे घण्टारवं तत्र देवताव्हानलक्षणम् ।।
म्हणजेच "देवाच्या आगमनार्थ आणि राक्षसांच्या गमनार्थ तू घंटे तुझा मधुर मंगलमय असा नाद कर''. अर्थात घंटा ही मंगलतेची सूचक आहे..पृथ्वी आणि आकाश यामधील पोकळीचे प्रतिक घंटा आहे.महाराष्ट्रातच नव्हे तर देशभरातील सर्व मंदिरात या घंटा आढळतात. मात्र महाराष्ट्रातील काही काही घंटा एवढ्या मोठ्या आहेत की, त्या तेथे कशा आणून लावल्या असतील याबद्दल मनात प्रश्नचिन्ह निर्माण होते. भिमाशंकरच्या मंदिरातील घंटचे वजन ५ मण आहे.. त्यावर १७२९ असा रोमन लीपीतील आकडा सुध्दा कोरलेली आहे. कदाचित त्या साली ती घंटा ओतली असावी. १७३९ च्या सुमारास चिमाजी आप्पांनी वसई जिंकल्यावर ठाणे जिल्ह्यातील वाशिंद गावातून ती आणली असावी असा अंदाज आहे.पंचवटीच्या परिसरात असणार्या नारोशंकर मंदिराच्या समोर सुध्दा अशीच घंटा आहे.. त्या घंटेला सुध्दा "नारोशंकराची घंटा' असे म्हणतात. या घंटेवर सुध्दा १७२१ असा आकडा आहे.. या घंटेचे सुध्दा एका पोर्तुगीज चर्चवरुन स्थलातर झालेले आहे. मंदिराच्या समोरच्या तटावर चढून सुध्दा ही घंटा वाजवता येत म्हणजे त्याची उंची आणि आकार केवढा असेल याची कल्पनाच केलेली बरी. खरेतर या मोठ्या प्रकारच्या घंटा म्हणजे मराठ्यांची विजयचिन्हे आहेत. पण सध्या मात्र ऊन, वारा, पाऊस यांचा मारा खात त्या उभ्या आहेत. या सर्व घंटा साधारणपणे पितळेच्या किंवा पंचधातूच्या बनविलेल्या असतात..
किर्तीमुख
अनेक मंदिरांच्या प्रवेशव्दापाशी एक राक्षसाच्या मुखासारख एक शिल्प कोरलेले दिसते. या शिल्पाच नाव आहे "किर्तीमुख". ही किर्तीमुख मंदिराच्या प्रवेशव्दापाशी ठेवण्या मागची सुध्दा एक कथा आहे.. किर्तीमुख नावाचा असूर होता. तो शंकराचा भक्त होता त्याने तहान भूक विसरून घोर तपश्चर्या केली. कालांतरान शंकर त्याला प्रसन्न झाले. शंकराने त्याला वर मागण्याची आज्ञा दिली. तेंव्हा प्रचंड भूकेची जाणीव झालेल्या त्या असूराने महादेवांना खायला देण्यास सांगितले. महादेवाने त्याला स्वत:च शरीर पायापासून खायला सांगितले. त्या असुराने तसे केल. तरीही त्याची भूक भागली नाही. त्यावर उपाय म्हणून शंकराने त्याला सांगित्ले, की तू माझ्या दारात येऊन बस आणि येणार्या जाणार्या सर्व भाविकांची पाप खा. तुला ती कधीच कमी पडणार नाही. तेव्हा पासून या किर्तीमुखाच शिल्प शिवमंदिराच्या दारात कोरण्याची प्रथा रुढ झाली. हरीश्चंद्रगडावरील मंदिराच्या प्रवेशद्वाराच्या शेजारी ही किर्तीमुख आहेत. अनेक ठिकाणी लहान लहान किर्तीमुखांतून फुलाच्या माळांची तोरण विणलेली दाखेवलेली आहेत.

मंदिरांवर किर्तीमुखाची विविध स्वरुपातील शिल्पे आढळतात. खिद्रापुरच्या कोपेश्वर मंदिराच्या प्राकारात १६ प्रकारात सादर केलेली किर्तीमुख त्यातील कलाकुसर यास तोड नाही. या प्रत्येक किर्तीमुखाची ठेवण वेगळी आहे. नक्षीकाम करणार्याने शिवापार्वतीलाही किर्तीमुखात बद्ध केलेले आहे. अनेक ठिकाणी किर्तीमुखातील नक्षीकामातून मोर आणि हंस साकारलेले दिसतात, याशिवाय फळफुले सुध्दा बहरलेली दिसतात. काही ठिकाणी व्याघ्र ही साकारलेले दिसतात. वानर सुद्धा किर्तीमुखाच्या शिल्पात दाखवितात. काही मंदिरात सभामंडपातही खांबांवर किर्तीमुख कोरलेली आहेत.
शिलालेख
काळ्या पाषाणात कोरलेली किंवा बांधलेली ही मंदिरे आपल्या सारख्या सामान्य माणसांचे नेहमीच लक्ष वेधून घेतात. ती पहात असतांना सहाजिकपणे मनात प्रश्न येतो की, कोणी बरे ही मंदिरे बांधली असतील? तर याच उत्तर मिळते ते शिलालेखांवरून आणि ताम्रपटांवरुन. शिलालेखांमध्ये मंदिराचा स्थापनकर्ता, काळ, त्याचे प्रारंभीचे स्वरुप, पुढे त्यात काय बदल झाले, त्यासाठी कोणी दान दिले या सर्व गोष्टींची माहीती मिळते.दक्षिण भारतातील आणि महाराष्ट्रातील अनेक मंदिरावर असे शिलालेख आढळतात. अशा प्रकारचे शिलालेख ही मंदिरासमोरच्या दिपमाळेवर, पुष्कर्णीवर, पायर्यावर, द्वारांवर, रंगेशिळे, उंबरठ्यावर, तुळवटांवर, खांबांवर तर कधी घंटांवर सुध्दा कोरलेले आढळतात.काही ठिकाणी मुर्तीच्या पायथ्याशी सुध्दा शिलालेख कोरलेले आढळतात.
यक्ष-यक्षी
भारतीय शिल्पकारांनी यक्षांची आणि यक्षींची योजना वास्तुकामात निरनिराळ्या ठिकाणी आणि निरनिराळ्या कामांसाठी केलेली पाहायला मिळते.पौराणिक कथांमधून यक्ष आणि यक्षी ही अतिमानवी परंतु देवांपेक्षा कनिष्ठ प्रकारची योनी असून यक्षीयोनी ही शांत, उपकारक अशा स्वभावाची रंगवण्यात आलेली आहे. कुबेर हा त्यांचा नायक किंवा राजा, हा धनाचा, संपत्तीचा अधिपती. यामुळे स्वाभविकपणे त्यांची शिल्पे मंदिरावर कोरण्यात आली. प्राचीन काळापासून लोकश्रध्देत स्थान मिळवून बसलेल्या स्थानिक व मर्यादीत शक्तीच्या देवतांचाही समावेश याच यक्षयोनीत होतो. असे करीतकरीत निसर्गातील वादळवारे,पूर, वृक्षवल्ली या सगळ्यांना मानवी म्हणजे यक्ष-यक्षीचे रुप देण्यात आले. मानवाने जे आपल्या आकलना पलिकडचे आहे आणि आपल्यापेक्षा सामर्थ्यवान अशा सर्व गोष्टींना यक्षरुप देऊन, त्याची पूजाअर्चा, उपासना करण्यात येऊ लागली. स्थलदेवता, जलदेवता, वृक्षदेवता यांना यक्षरुप देऊन त्यांची शिल्पे मंदिरात कोरण्यात आली. पूरात एखादा माणूस वाहून जाणे, अपघातात दगावणे या गाष्टी नैसर्गिक न समजता मानवाने त्याला जलदेवतेचा, वृक्षदेवतेचा कोप असे स्वरुप दिले आणि सर्व देवता यक्ष योनीत जमा झाल्या आणि माणूस या अतितमानवी शक्तीपुढे नतमस्तक झाला. अशा प्रकार या यक्ष यक्षींचा संभार वाढत गेला.

मंदिर शिल्पात यक्षांना थोडी अवघड कामे दिली आहेत. ती म्हणजे भारवाहनाची! मंदिराच्या खांबाना आपल्या खांद्यावर तोलून धरण्याची. या भारवाहकांना "किचक' असेही म्हणतात. रतनगडच्या पायथ्याशी असणार्या "अमृतेश्वर' मंदिरात अशा प्रकारचे यक्ष आहेत. वेरूळच्या कैलास मंदिरात तीन तीनच्या समूहांत पट्टावरील हसतमुख,बावळट चेहर्याच्या यक्षांना पाहून मन प्रसन्न होत. याच मंदिरावर काही यक्षगण वीणा वादन करतांना दिसतात तर काही यक्षगण आपल्याच धुंदीत नाचतांना दिसतात. तात्पर्य काय तर शिल्पकारांनी निर्माण केलेल्या प्रत्येक शिल्पाच्या मागे काहीतरी निश्चित असा अर्थ आहे
व्याल
मध्ययुगीन मंदिरांच्या भिंतीवर जे शिल्पकाम आहे त्यात अनेक ठिकाणी पुढचे पाय वर उचलून, मागच्या पायावर उभा असलेल्या सिंहासारखे, हत्तीसारखे डोके असलेला एक प्राणी दिसतो. त्याला "व्याल' असे म्हणतात.नागपूर पासून २१६ कि.मी. अंतरावर असणार्या मार्कंडी नावाच्या मंदिरावर विवध प्रकारच्या व्यालांच्या मुर्ती आढळतात. मंदिरावर भिंतींना जेथे जोड येतो तेथे हा कोरलेला असतो. या व्यालांचे अनेक प्रकार आहेत. सिंहव्याल, व्याघ्रव्याल, गजव्याल, वृकव्याल हे त्यापैकीच काही. बहुतेक मंदिर शिल्पात या व्यालांच्या पाठीवर स्वार असतो. तर पायाखाली एखादा बैठा यक्ष असतो. या व्यालांची निर्मिती पश्चिम आशियात झाली . इराणमध्ये मौर्यकाळात अनेक शिल्पांमध्ये याचा वापर करण्यात आला. शिल्पकारांच्या कौशल्यामुळ हा परका, काल्पनिक प्राणी मंदिर स्थापत्याचा एक हवाहवासा वाटणारा, आकर्षक आणि आवश्यक भाग झाला. सर्वच व्यालमुर्ती मागच्या पायावर उभ्या, पुढचे पाय वर उचललेल्या अशा अवस्थेत आहेत असे असूनही या व्यालमुर्ती कधी देवता, सुरसुंदरी या मूर्तींच्या आड येत नाहीत किंवा त्यांच्याशी स्पर्धा सुध्दा करत नाहीत.
नाग
काही मंदिरांवर किंवा मंदिरा बाहेर नागाचे शिल्प कोरलेली आढळतात. नाग हे वास्तविक "काळाचे प्रतीक' आहे.. नाग हा अतिशय वेगाने सरपटत जातो. काळही तसाच, तो अतिशय वेगाने पुढे सरकतो. तो केंव्हा सुरु झाला आणि कोठवर जाणार हे सांगता येत नाही. काळाचा दुसरा अर्थ म्हणजे "अनंत' म्हणूनच नागालाही "अनंत' म्हणतात. काळ ज्याच्या हातात आहे तो देव, देखिल याच नागाचे एक रुप आहे.
दिपमाळ
दिपमाळ हा एक महाराष्ट्रीयन शिल्प प्रकार आहे. देवाच्या मुर्ती समोर अखंड नंदादिप तेवत ठेवण्याची एक जुनी पध्दत आहे.. देवाच्या आरतीच्या वेळी दिप लावतात. उत्सव प्रसंगी शहरात दिपवृक्ष पाजळत असल्याचे उल्लेख रामायण ग्रंथामध्ये आलेले आहेत. दक्षिण भारतातील मंदिरांत दगडाच्या व पंचधातूच्या दिपलक्ष्मी आणि दिव्यांची झाडे लावण्याची प्रथा आहे. याशिवाय देवालयासमोर दिपदंड किंवा दिपस्तंभही असतात. पण दिपमाळ हे महाराष्ट्रीयन मंदिर रचनेतील खास वैशिष्ट्य आहे.विटांचा किंवा दगडांचा निमुळता होणारा स्तंभ उभारुन त्याच्यात ओळीने हात बसविलेले असतात. उत्सवाच्या प्रसंगी, दिवाळीच्या वेळी त्रिपुरी पौर्णिमेला या दिपमाळा उजवळण्यात येत असत. म्हणूनच म्हटले आहे. "दिपमाळ उजळे। मंदिरी परमप्रकाश पडे।।". याचा आणखी एक फायदा म्हणजे उंचीमुळे सर्वांना सणांची एक सार्वत्रिक घोषणा होत असे. नवस फेडण्यासाठी देवळासमोर दिपमाळ उभारण्याची प्रथा मराठेशाहीत रुढ होती. विषेशत:जेजुरीच्या मंदिराच्या बाहेर असलेल्या शेकडो दिपमाळा याचीच साक्ष देत आजही उभ्या आहेत.
वीरगळ :-
अनेकवेळा मंदिराच्या प्राकारामध्ये एक उभट आकाराची उंच आयताकृती अशी शिळा पडलेली दिसते. या शिळेलाच "स्मारक शिळा' असेही म्हणतात. धारातिर्थी पडलेल्या वीरांची स्मारकशिळा म्हणजेच "वीरगळ'. तसेच व्यक्तीच्या निधनानंतर अशा प्रकारची स्मारके उभारण्याची प्रथा होती आणि त्यातही एखादा वीर किंवा राजा किंवा थोर व्यक्ती असेल तर त्यासाठी अशाप्रकारची वीरगळ उभारण्यात येत असे. अर्थातच ही थोर व्यक्ती किंवा हा वीर पूजनीय असल्याने त्या वीरगळीला मंदिरात स्थान मिळाले. कर्नाटक मध्ये या वीरगळींना "कांदळ" म्हणतात. या वीरगळीवरील कोरीव कामाची योजना सर्वसाधारणपणे एकाच स्वरुपाची असते. या शिळांचे तीन भाग किंवा चौकटी पाडलेल्या असतात.. तळाच्या चौकटीत वर्ण्य म्हणजे विषय म्हणजेच वीराचे युध्द त्याचा मृत्यू, मधील चौकटी मध्ये त्याचे स्वर्गारोहण व वरील चौकटीमध्ये तो वीर स्वर्गात करीत असलेली ईशपूजा याप्रमाणे दृश्ये चित्रीत केलेली असतात. तात्पर्य, वीरगळ म्हणजे वीपुरुषाचा एक संक्षिप्त चरित्रपटच होय
कुंड/ पुष्करणी :-
पंचोपचार पूजा, अष्ट्भोग यासाठी म्हणून मंदिराच्या परिसरात अनेक आकाराच्यार बारवा निर्माण करण्यात आल्या. लहान आड ही मंदिर वास्तूच्या पावित्र्याची संकल्पना जपण्यासाठी निर्माण करण्यात आली. याच बरोबर मंदिरात विशेषत: शिवमंदिरात अखंड चालणार्या जलाभिषेकासाठी म्हणून गर्भगृहाच्या मंदिर परीसरातील एखादे "कळ्ळाल' पुष्करणी किंवा कुंडातील व्यवस्था कलेली होती. देवालयात जाण्यापूर्वी स्नान करुन शुचिर्भूत होऊन जाता यावे यासाठी ही व्यवस्था आवश्यक मंदिरासाठी लागणारा दगड विहिरीचा आकार मोठा करुन त्यातून निघत असे तोच वापरला जाई. अनेक ठिकाणी कुंडाना किंवा पुष्करणीला चारही बाजूंनी पायर्या असतात.
मंदीराचे शिखर :-
देवळांचा पहिल्यांदा नजरेत भरणारा भाग म्हणजे त्याचे शिखर किंवा छप्पर.सर्वसाधारणपणे हे कोनाकृती असते. आपण पाहिले आहे की सुरवातीच्या देवळांची छप्परे सपाट होती. त्या ऐवजी हा त्रिकोणी आकार कसा आला ? एक विचार असा की सुरवातीला देवळे ही गिरिशिल्पे होती. म्हणजे नैसर्गिक गुहा मोठी करून त्यात देऊळ तयार केले वा डोंगर खोदून, गुहा निर्माण करून,त्यात देऊळ निर्माण केले. कसेही असले तरी लांबून हे देऊळ पहातांना, तुम्हाला त्याचे छप्पर म्हणून डोंगरच दिसतो; बरेचदा निमुळता होत गेलेला त्रिकोणी डोंगर. आता तुम्ही मैदानात देऊळ बांधले तर हा डोंगराचा भास निर्माण करावयाला डोंगर कोठून आणणार? तर त्या ऐवजी छप्परच निमुळते केले गेले. पण हे एकदम झाले नाही.
सपाट छप्पर करणे तसे सोपे. भिंती उभ्या करा, त्यांवर वासे टाका, वाश्यांवर फ़रशा टाका. काम खलास. जो पर्यंत आकार लहान होता तो पर्यंत हे लिहण्यासारखेच सोपे होते. ३०-४० फ़ूट लांबीच्या, इमारती लाकडाच्या तुळया आसेतूहिमालय सर्वत्र मिळत होत्या. देवळाचा आकार वाढल्यावर दगडी छप्परांचे वजन इतके वाढले की त्यांचा भार लाकडी तुळयांना झेपणे अशक्य झाले. दगडी तुळयांना भार झेपला असता पण एवढ्या लांब दगडी तुळया मिळणे शक्यच नव्हते.या करिता काय उपाय शोधले गेले ते पहाण्या आधी सपाट छपारातील एक बदल (Veriation) पाहू.
या प्रकारच्या छप्पराला नाव आहे "गजपृष्ट". नाव मजेदार वाटते पण आहे मात्र एकदम चपखल. सपाट छपराचा एक मोठा तोटा म्हणजे पावसाळ्यात पाणी वाहून जाण्यास जागा नसे. उपाय सोपा असल्याने लगेच अमलात आणला गेला. आयताकृती छप्पराच्या समोरासमोरच्या दोन बाजू उतरत्या केल्या म्हणजे पाणी साचत नाही. आणि असे छ्प्पर हुबेहुब हत्तीला मागून पाहिले तर त्याच्या दिसणाऱ्या पाठीसारखे दिसते. द्राविड शैलीच्या देवळांची बरीच छप्परे अशी असतात.महाबलीपुरम येतील मंदिराच्या चित्रावरून एकदम पटेल
आता उपाय बघू. पहिला उपाय म्हणजे मधे खांब उभे करणे. हे "कॉलम" म्हणून काम करतात आणि "बीम"ची लांबी एकदम कमी होते. ४० फ़ूट X ४० फ़ूट च्या मोठ्या दालनात दहा दहा फ़ूटावर नऊ खांब उभे केलेत तर तुळईची लांबी दहा फ़ूटावर येते. आणि जर हे खांब सुशोभित केले तर ते कशाकरिता बांधले हे ही लक्षात येत नाही. उलट " या देवळाचे खांब मोजता येत नाहीत " अशीच प्रशंसा केली जाते!".अबब म्हणावयाचे आहे? श्रीरंगमच्या विष्णुमंदिरातील एका मंडपाचे नाव आहे "हजारीमंडप" लांबी १७५ मी. व रुंदी ५० मी. यात फक्त ९५३ खांब आहेत ! बाजूचे स्तंभ साडे तीन मीटर उंच आहेत, आतले त्याच्या दुप्पट.सगळे दगडी आणि बारकाईने कोरलेले !
पण स्थपतींना पूर्ण कल्पना होती की हे खांब अडचण आहेत. नृत्यमंडपात, कल्याणमंडपात त्यांना जागा नाही. त्यांनी कमानीची कल्पना छप्पर बांधण्याकरिता वापरली.छोटे दगड किंवा वीटा कमानी व तत्जन्य घुमट उभारण्याकरिता वापरले गेले. वापर वीटांचा आहे व उदाहरणेही फ़ार नाहीत. पण घुमट आहे म्हणून त्यांना Indo-sarsenik म्हणावयाचे कारण नाही. आणि एक मार्ग म्हणजे दगडांचे एकावर एक असे थर बसावयाचे की मधल्या उघड्या भागाचा आकार कमी कमी होत जाईल व शेवटी सर्वात वर एवढाच आकार राहील की तो एकाच दगडाने झाकता येईल. तंजावूर येथील बृहडेश्वर मंदिरातील हा शेवटचा दगड ८३ टन वजनाचा आहे ! पिरॅमिड्सची आठवण झाली की नाही ? बांधणीमुळे छपराला "पायऱ्या" किंवा "मजले" निर्माण होतात. अर्थातच अशा छप्परांचा भार प्रचंड असल्याने भिंती भक्कम, जाडजूड लागतात. वरच्या पायरीचा प्रत्येक दगड खालच्या पायरी़च्या थोडासा पुढे झुकलेला दिसतो. हे काम फ़रशा भिंतीला समांतर मांडून करता येईल वा चौकानाचे कोन छेदले जातील अशा प्रकारे फ़रशा मांडून करता येईल.उतरंडीच्या छप्पराच्या या पायऱ्या सलग एका रेषेत असतील तर ती नागरी शैली; मजले स्पष्ट दिसत असतील तर द्राविड शैली. पण हे मजले वेगळे आहेत याची जाणीव ठेवण्याकरिता त्यांना "भूमि" म्हणतात. मंदिरांच्या शैलींची माहिती आपण पुढे घेणार आहोतच; पण इथे नमुद करून ठेवावयास हरकत नाही की नागर व द्राविड शैलींमध्ये " भूमी"चे सुशोभन वेगवेगळ्या पद्धतीने करतात व हा दोहोंमधील एक महत्वाचा फरक आहे.
भिंतींचे सुशोभन करण्यासाठी वापरावयाचे सर्व साधने येथेही वापरण्यात आली आहेत.कलष, मूर्ती, स्तंभ, कोनाडे, पाने-फ़ुले, मिथुने, रत्नहार इत्यादी सर्वांचा उपयोग केला गेला. सगळ्यात जास्त गमतीचा भाग म्हणजे ही शिखरे गाभारा-मंडप यांच्यावरून खाली उतरून देवळासमोर गोपुरे म्हणूनही आली. काही फ़ोटो बघू.
(आणि देवळांच्या प्रयेक फ़ोटोत छप्परे दिसतातच की.)

मजले कसे तयार करत याचे एक चित्र पहा. खालचा मोठा चौरस भाग फरश्या आत आत आणत वर लहान झाला आहे.
(१) महाबलीपुरम ...गजपृष्ट छप्पर. शेजारी हत्ती असल्याने लगेच साम्य कळते.
(२) पट्टडकलु-१ ... द्राविडी शैली. भूमीचे स्थर वेगवेगळे दिसतात.
(३) पट्टडकलु-२ ... नागरी शैली. भूमींचे कोन एका रेघेत.
(४) सोमनाथपूर . भूमी एकदम निरनिराळ्या बघता येतात.
एक पाषाणी मंदिरे :-
गिरिशिल्पे तयार करतांना कलाकाराच्या मनात विचार आला असणार कीं, "अरे, मी डोंगर कोरून मंदिर तयार करतो, दगड घेऊन मूर्तीही बनवतो. मग एक मोठा दगड घेऊन मंदिर का बनवता येणार नाही ? " काम अवघड तर होतेच पण जास्त "चॅलेंजिंगही " होते. तयार मूर्ती, हस्त, तरंग, एके ठिकाणी करून दुसरीकडे मंदिरात बसवणे सोपे होते. आता छिन्नीचा पहिला घाव घालावयाच्या आधी पीठ, भिंत, शिखर आतील व बाहेरील मूर्तीकाम सगळे, सगळे काही एकाच्या नव्हे, सगळ्या कारागीरांच्या मनावर बिंबण्याची गरज होती.आणि हे किती काळा करिता ? वर्ष-दोन वर्षांकरिता ? लक्षात घ्या, वेरुळ्चे कैलास मंदिर हे एकपाषाणी मंदिर घडवावयाला कलाकारांच्या काही पिढ्या लागल्या ! आज संगणकाच्या युगात 3D नकाशा काढणे व त्याच्या अनेक प्रति करणे सोपे आहे पण पंधराशे वर्षांपूर्वी याला चमत्कारच म्हणावयास पाहिजे.
एक पाषाणी मंदिरे सगळ्या भारतात आढळतात. कांगडा जिल्हा (मस्त्रूर), मध्य प्रदेश (धामणूर), तिरुनेलवेली (कगमुविल), वेरूळ (कैलास व छोटा कैलास), महाबलीपुरमधील रथ याची साक्ष देतात. वेरूळ्चे कैलास व रथ एवढ्यांचीच माहिती आपण येथे बघू.
कैलास :
जगामधील ही अशी एकमेव वास्तू आहे. डोंगराच्या दरडीपासून काटकोन करून ६३ मीटर लांबीचे दोन चर खणण्यात आले. आतल्या टोकांना जोडणारा ४५ मीटर लांबीचा चर खणून ६३मी.x 45 मी x ३० मी. उंच (किंवा खोल म्हणा) असा एक महाप्रचंड खड्डा तयार झाला. त्यात होता ५० मी. लांबीचा (पूर्व-पश्चिम), ३३ मी.रुंद व २९ मी. उंच शिलाखंड. कैलास निर्माण करण्यासाठी समोर होता पट्टडकल येथील विरुपाक्ष मंदिराचा आराखडा. चला तर, लावा शिड्या व करा सुरवात शिखरापासून. प्रथम जेव्हा ऐकले की या मंदिराची सुरवात शिखरापासून झाली तेव्हा फार आश्चर्य वाटले होते. पण नंतर जेव्हा या विषयावरील वाचनाला सुरवात केली तेव्हा कळले की सर्वच गिरिशिल्पात सुरवात वरूनच करतात. फोडलेले दगड फेकण्यापासून साफसफाई करण्यास, केलेल्या कामाचे सिंहावलोकन; जास्त योग्य शब्द विहंगावलोकन, करावयास हीच योग्य पद्धत.
वेरुळमध्ये हिन्दु गिरिशिल्पांचा बौद्ध लेण्याशी असणारा निकटचा संबंध प्रकर्षाने प्रचीतीस येतो. चापाकार विधान गाळण्यात आले (महायान काळात बुद्धांनीही तेच केले). सर्वात बाहेर एक ओवरी, आत मंडप, मंडपाच्या तीनही अंगाला चौरस दालने (नंतरच्या काळात चौकटी), चौकटींमध्ये प्रचंड शिल्पपट्ट व मागील भिंतीच्या मधल्या दालनात गाभारा. कैलास हे एकपाषाणी शिल्प असल्याने येथे आतील व बाहेरील दोन्ही बाजूच्या सजावटीला वाव होता. प्रथम इमारतेच्या वैधानिक बाजूबद्दल थोडे. याची शैली द्राविड.



यात तुम्हाला डोंगरात खणलेले चर व शीलाखंडातील मंदिर पहाता येते. गज, विजयस्तंभ, विमान, शिखर आदी वरून फोटो काढला असल्याने नीट दिसते.
रावण कैलास उचलताना.
वर सांगितल्या प्रमाणे ज्या शीलाखंडातून मंदिर बनवण्यात आले त्याच्यापेक्षा वेगळ्या अशा आठ मी.चौरस अशा खंडातून नंदीमंडप तयार केला. नंदीमंडपाच्या दोन्ही बाजूंना दोन मोठे ऐरावत व त्यांच्या शेजारी सुबक असे ध्वजस्तंभ उभे आहेत. आणि हो, या भागात न आढळणारे गोपुर, साधे, लहान व शाला पद्धतीचे ! गोपूर, नंदीमंडप व मुख्य मंदिर दुमजली आहेत.नंदीमंडप व मंदिर यांचा पहिला मजला भरीव असल्याने त्याला एकमजली पीठ म्हणावयास हरकत नाही. वरचे मजले एकमेकांना पुलांनी जोडले आहेत. चौरस गाभारा, अंतराळ व चौरस मंडप ही मुख्य अंगे. तीन बाजूंना अर्धमंडप, गाभार्याभोवती प्रदक्षिणा मार्ग व ५ उपमंदिरे आहेत.मंडपात चार खांबांचा एक असे चार गट आहेत. त्यांना अनुसरून भिंतीत अर्धस्तंभही आहेत. गाभार्यात स्तंभ नाहीत.
पीठ किंवा तळमजला हा सर्वात प्रेक्षणीय भाग. जमिनी लगतचा कुंभपट्ट इत्यादी थरांच्यावर एक चांगला रुंद पट्टा आहे. तळमजल्याची भितच म्हणा; त्यावर हत्ती, सिंह यांच्या पूर्णाकृती मूर्ती पूर्ण उठावात कोरल्या आहेत. त्यावर पट्ट, कुंभ, कपोत. त्यावर येते दुसर्या मजल्याची भिंत. भिंतीवर अर्धस्तंभ मालिका व देवकोष्ट आहेत. माथ्यावर कूटशालाहार असून वर द्राविड पद्धतीचे विमान व त्यावर अष्टकोनी शिखर आहे.
राष्ट्रकूट राजा कृष्ण (इ.स.७५७ ते ७८३ ) याच्या कालात सुरवात झालेया या मंदिराचे काम १०० वर्षे चालले होते. या वेळी द्राविड शैली महाराष्ट्रात प्रचलित नव्हती. तेव्हा ही स्फूर्ती व कौशल्य दक्षिणेतल्या कांचीकडून आले असावे काय ? मंदिराच्या आतील भागावर चुन्याचे विलेपन होते व त्यावर रंगकाम केलेले होते. कैलास सारखेच वेरुळ येथील "छोटे कैलास" ही त्याचीच एक लहान (व कनिष्ट दर्जाची) एक पाषाणी प्रतिकृती.
कैलास येथील मूर्तीकामाबद्दल येथे लिहित नाही. कलेच्या बाबतीत तुलना अप्रस्तुत असते. पण तरीही स्वत:चे वैयक्तिक मत असतेच की नाही ? येथील मूर्तीकाम जिवंत व रसरशित आहे. तुलना जर दुसर्या प्रसिद्ध दिलवाड्याच्या संगमरवरी मूर्तींशी केली तर संगमरवरी मूर्ती निर्जीव वाटतात. एकच उदाहरण देतो : रावण कैलास पर्वत उचलत आहे या शिल्पात शंकर तिकडे दुर्लक्ष करत आहे, बेफिकिरच आहे म्हणा ना. तर पार्वती मात्र स्त्रीसुलभ भीरूपणाने, घाबरून शंकराला बिलगली आहे. हे भाव शिल्पात प्रगट करणे काय सोपे आहे ?
महाबलिपुरम येथील "रथ" :-चेन्नाईच्या दक्षिणेला साधारणत: ६० कि.मी. समुद्राकाठी महाबलिपुरम (मामल्लपुरम-महामल्लपुरम) येथे पल्लव राजवटीतील नरसिंहवर्मनने खोदलेली सहा एकपाषाणी मंदिरे आहेत. याशिवाय, मंदिरे, गिरिशिल्पे, डोंगराच्या उतारावर केलेले शिल्पकाम वगैरे पहावयास किमान दोन दिवस लागतील. आणखी एक आकर्षण म्हणजे आजही तेथे शिल्पकार मूर्ती घडवत असतात.अगदी बाजारात. तुम्हाला पूर्वी कसे काम करत असावेत याची कल्पना येऊ शकते.दोन समुहात हे रथ असून दक्षिण समुहात चार, मध्ये एक व पश्चिमेस एक असे सहा रथ आहेत. द्रौपदी,धर्मराज,अर्जुन व पिडारी हे "कूट" पद्धतीचे रथ आहेत. म्हणजे त्यांची विधाने चौरस आहेत व त्यांना अनुसरून छपरे चारी बाजूंनी उतरती आहेत. भीम आणि गणेश रथ आयताकार विधानाचे व दोहो बाजूला उतरत जाणारी छप्परे असलेले आहेत.त्यांच्या कण्यावर बारीक कळसांची ओळ आहे. चित्रात आपण दोनही पद्धती पाहू शकता. रथ, एक-दोन-तिमजली आहेत. नकुल-सहदेव हा चाप पद्धतीचा रथ आहे व त्याचे छप्पर गजपृष्ठाकार आहे. स्तंभ अष्टकोनी, काहिसे निमुळते असून त्यावर कुंभ आहेत, पायाशी गजमूर्ती कोरलेल्या आहेत. द्रौपदी व धर्मराज या रथात दुर्गा व स्कंद यांच्या मूर्ती आहेत, इतरत्र नाहीत. असे वाटते की या रथांची कामे पूर्ण झालेली नाहीत.
कांगडा जिल्ह्यातील मस्रूर येथे नागरी शैलीतील एकपाषाणी मंदिरे नवव्या शतकात कोरली असून जास्त सौंदर्यदृष्टी ठेवून केलेली आहेत. पडझड फार झाली आहे. इतर देवी मंदिरांच्या तुलनेत दुर्लक्षित आहेत.
गजपृष्ट
गणेशरथ
द्रौपदी रथ
चारी बाजूंनी उतरते छप्पर

मस्रूर, कांग्रा जिल्हा
महाबलिपुरम येथील रथ. कूटशाला, गजपृष्ट, इत्यादी प्रकार लक्षात येतील.
मंदिरांचे प्रमुख प्रकार आणि त्यांना ओळखण्याच्या खुणा **
कल्पक भारतीय वास्तुकारांनी भौगालिक परिस्थितीनुसार अनेकविध प्रकारांची सुंदर सुंदर मंदिरे निर्माण केली. या मंदिरांचे अनेक प्रकार आहेत. भारतात मंदिर बांधणीत साधारणपणे २ मुख्य प्रकार आहेत;
A. उत्तर भारतातील नागर शैली
B. दक्षिण भारतातील द्राविड शैली
सर्वप्रथम आपण दोन मुख्य शैली समजून घेऊ नागर आणि द्राविड.
नागर व द्राविड शैली
संगीतात घराणी असतात; ग्वाल्हेर, किराणा, जयपूर वगैरे. म्हणजे काय हो ? शेवटी सगळेजण सारेगम हे सूर व बांधलेले रागच गातात ना ? काय होते, संगीतात सौंदर्य निरनिराळ्या प्रकाराने कलाकाराला भावते.कोणाला सूरात तर कोणाला तालात, कोणाला संथ, विलंबित आलापीत तर कोणाला आक्रमक दृत तानेत, या सौंदर्याची भुरळ पडते. तो संगीतातील या भागाला जास्त मह्त्व देतो. मग घराणी जन्मास येतात. मग रसिकही ग्वाल्हेर गायकीत सुलभ, सरलता, किराण्यात स्वराचा गोडवा तर जयपूर गायकीत विद्वत्ता शोधू लागेतो. सगळ्याच गायकीत स्वराची सच्चाई व तालाचा पक्केपणा गृहित धरलेला असतोच. पण फरक असतोच. हे सर्व कलांत दिसून येते; चित्रकलेत, नृत्यातही. मग मंदिर बांधणीतही हे आढळणारच की. त्यांना म्हणावयाचे शैली. प्रमुख दोन, नागर व द्राविड. केरळ व कर्नाटकच्या थोड्या भागातील वेसर शैलीत गोलाकार देवळाचा प्रकार आढळतो पण तो तसा गौणच. आता एका शैलीतील सर्व मंदिरे सारखी नसतात. एकाच घराण्यातील उ.अ. करीमखॉ, गंगूबाई हनगळ व पं. भीमसेन यांचे गाणे स्वतंत्रच. तसेच नागर शैलीतील राजस्थानातील व ओरीसातील मंदिर वेगळेच. त्यामुळे या दोन शैलींमध्येही उपशैल्या उपजल्याच. गंमत म्हणजे गायनात जशी घराण्यांची नावे स्थानावरून पडली, ग्वाल्हेर, किराना, जयपूर, वगैरे तेच येथेही घडले. राजस्थान-गुजराथ शैलीची मंदिरे निराळी व ओरिसातली निराळी; दोन्हीही नागर शैलीचीच बरे का. या शिवाय मंदिरे बांधतांना प्रचंड प्रमाणात पैसा पाहिजे. तो पुरवणार राजघराणे. तेंव्हा त्यांच्या नावाच्या उपशैल्या आल्या. वाकाटकांच्या काळात बांधली गेली ती मंदिरे वाकाटक शैलीची. होयसाळांच्या राजवटीतील शैली होयसाळ शैली. उत्तरेत चंदेल राजांनी पैसा पुरवला, मग खजुराहो येथील मंदिरे चंदेल शैलीची. ( विसाव्या शतकात बिर्लांनी अनेक शहरात मंदिरे उभी केली, ती "बिर्ला मंदिर" या नावानेच त्या गावात ओळखली जातात; म्हणूनच म्हटले आहे "धन मूलमिदं जगत " ) हां, प्रत्येकातला फरक दाखवता येतो पण नावे पडली ती अशीच. तुम्ही विचारलेत "नावात काय आहे ?" तर उत्तर देणे अवघड आहे.Rose is a rose is rose हे खरेच. पण प्रत्येक शैलीची वैशिष्टे माहीत असतील तर कोणार्कला काय पहावयाचे व बेलूरला काय हे तुम्ही जास्त डोळसपणाने ठरवू शकाल. गायनातला आनंद मिळवतांना गायकाच्या घराण्याचे नाव माहीत पाहिजे असे नाही. पण घराणे व त्याची वैशिष्टे माहीत असतील तर हा आनंद जरा वरच्या दर्जाचा असेल.
आपण पाहिले की सुरवातीला मंदिर म्हणजे गाभारा, लहानसा मंडप व वर सपाट छप्पर. बांधणार्याला फारसा वाव नव्हता. जेंव्हा आकार वाढला, सजावटी, रुपके, स्तंभ वाढले तेंव्हा खरी मजा आली. आता कलाकाराला कल्पनेचे पंख फुटले. एक म्हणाला, " माझे मंदिर उंच असणार. त्याचे शिखर पाच कोसावरून दिसले पाहिजे." दुसरा म्हणाला, "उंचीला काय मह्त्व द्यावयाचे ? भक्त काय माकडासारखे वर चढून बसणार आहेत ? त्याच्या ऐवजी माझा मंडप दोन हजार भक्तांना पुरून उरेल. मंदिराच्या कल्याणमंडपात एक काय दोन लग्ने लावा." झाला दोन शैलींचा उगम. ओरिसा, मध्यप्रदेश, उत्तरप्रदेश, राजस्थान, गुजराथ, थोडक्यात उत्तर भारताने हिमालय समोर ठेवून पहिली शैली स्विकारली; तिला म्हणावयाचे "नागर शैली ". दक्षिण भारताने दुसरी कल्पना स्विकारली, तिला म्हणावयाचे " द्राविड शैली". थोडे सुलभिकरण केले आहे, पण कळावयास सोपे. बाकी फरक पुढे बघणार आहोतच.
कोणतीही दोन देवळे सारखी नसतात, नव्हे, ती सारखी असू शकत नाहीत. कारण ती कुठल्यातरी कारखान्यात तयार झालेली नसतात. निरनिराळ्या कलाकारांनी, निरनिराळ्या ठिकाणी, निरनिराळ्या वेळी त्यांची निर्मिती केलेली असते. त्यामुळे प्रत्येक देऊळ "एकमेव"च असते. तरीही प्रत्येक देवळात काही गोष्टी समान असणारच, उदा. गाभारा, विमान, मंडप इत्यादी सर्व देवळात आढळणारच. तसेच कलाकारांची "घराणी" असतात व त्यातील प्रत्येक कलाकाराच्या कृतीत साम्य असणारच.पण या साम्यांमुळे "शैली" निर्माण होत नाही. त्याकरता पाहिजे "स्थपति". (Architect and Chief Engineer). याच्या डोळ्यासमोर देवळाचा आराखडा तयार होतो व त्याप्रमाणे पुढे काही वर्षात देऊळ तयार होते. असे देऊळ पाहिल्यानंतर पुढच्या स्थपतीला ती कल्पना आवडली तर तो त्या प्रमाणे (तोच नव्हे) दुसरा आराखडा तयार करतो, देऊळ बांधतो. हळुहळु नवीन "शैली" जन्म घेते. उत्तर हिंदूस्थानात हिमालय होता, स्थपतीला तो भावला, त्याने गगनचुंबी, उत्तुंग विमान असलेले देऊळ बांधले. तो मुख्य आदर्श समोर ठेवून तयार झालेल्या देवळांना "नागर शैली"ची असे नाव पडले. दक्षिणेत उंची ऐवजी ऐसपैस लांबी-रुंदी असलेली देवळे प्रसारात आली, त्यांना "द्राविड शैली" म्हणू लागले. संमिश्र प्रकार करून पाहिला, तो लोकप्रिय झाला नाही,मागे पडला, नाहिसा झाला. सर्वसाधारणपणे देवळे चौकोनी असतात, पण काही गोलाकारही बांधली गेली (केरळ,कर्नाटक).ती झाली "वेसर" शैली.
नागर शैलीचं वैशिष्ट्य म्हणजे, गर्भगृहावर उंचच उंच शंकूसारखं निमुळतं होत जाणारं शिखर आणि शिखरावर बसवलेला गोल आवळ्याच्या आकारातला आमलक; किंबहुना आवळ्याच्या आकारात आहे म्हणूनच त्याला ‘आमलक’ असं नाव दिलेलं आहे. द्रविडशैलीच्या मंदिरांत शिखराच्या उंचीपेक्षा विस्ताराला जास्त महत्त्व आहे. द्रविडशैलीचं शिखर तळाला पसरत पिरॅमिडच्या आकाराचं असतं आणि अगदी वर आमलकाऐवजी एक मोठी शिळा बसवलेली असते, जिला ‘स्तूपी’ असं नाव आहे. द्रविडशैलीचं अजून एक मोठं आणि सहज लक्षात येण्यासारखं वैशिष्ट्य म्हणजे भव्य अनेकमजली गोपुर! हे गोपुर मंदिराच्या संपूर्ण प्राकाराभोवती मोठा तट बांधून प्रवेशद्वारावर बांधलेलं असतं. हेही खरेच कीं कुठे तरी या कल्पनांना प्रत्यक्ष रूप देवून सुरवात केली गेली असली पाहिजे. पट्टडकल, एहोळे, कर्नाटकातील विजापूर-गदगच्या जवळील गावे. इथे तुम्हाला या दोनही प्रकारची मंदिरे शेजारी शेजारी बांधलेली दिसतील. अगदी सातव्या शतकापासूनची. या दोनही शैलीतली मंदिरे आपण बघा. नागर शैलीची राजस्थान, मध्य प्रदेश, येथील नागर मंदिरे पाहिलीत तर पीठाबाहेर मंदिराचा संबंध उरतच नाही असे आढळेल. उलट द्राविड शैलीतील मंदिरांच्या बाहेरचे आवार कित्येक पटीत मोठे असते. उदा.: त्रिचनापल्लीचे श्रीरंगम हे विष्णुमंदिर आकाराने अगदी छोटे आहे. पण त्याला ७ आवरणे (प्राकार) आहेत, एकाबाहेर एक. सर्वात आतले लहानात लहान आहे ८५ मी.x ६३ मी. लांबरुंद, तर सर्वात बाहेरचे आहे ९६० मी.x ८५० मी. लांबरुंद. एकुण १४ गोपुरे आहेत. सर्वात बाहेरच्या दक्षिणेकडील गोपूराचे मोजमाप आहे ४५ मी. लांब व ३५ मी. रुंद. दरवाजा असलेला पहिला मजला आहे २० मी. उंच. गोपूर पुरे झाले असते तर उंची झाली असती १०५ ते ११० मी. चवथ्या प्राकारातला हजारी मंडप आहे १७५ मी. लांब व ५० मी. रुंद. हजारी मंडप नाव असले तरी तितके स्तंभ नाहीत; केवळ ९५३ आहेत ! द्राविड सौंदर्य कल्पना लक्षात आली ना ?
ओरिसा, बंगाल, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, राजस्तान, गुजराथ येथे मुख्यत्वे करून नागर शैली प्रसारात होती. मुख्यत्वे म्हणावयाचे कारण उत्तर हिंदुस्थानातही द्राविड शैलीची देवालये आहेत. कर्नाटक, आंध्र, तामिळनाडू व केरळात द्राविड शैली आढळते. पण पट्टडकलला नागरी देवालये आहेतच.
वर सांगितल्या प्रमाणॆ कोठल्याही शैलीत copy हा प्रकार नव्हता. त्यामुळे या प्रमुख शैलींमध्ये उपशैली निर्माण होऊं लागल्या. यांना नावे देतांना राजघराण्यांची नावे देण्यात आली.उदा. साळुंकी, चालुक्य,होळसाळ, इत्यादी. या शिवाय स्थानिक नावे आहेतच.उदा. काश्मीरी,ओडिसी वगैरे.
नागर शैली : गाभारा,समोर लंब चौकोन मंडप,गाभारा व मंडप यांच्यामध्ये अंतराळ,मंडपात प्रवेश करवयाला अर्धमंडप हे मुख्य भाग. गर्भगृहावर निमुळते होत जाणारे उंच शिखर.प्रांगण असेल तर त्यात छोटी उपमंदिरे, मंदिराच्या इतर भागावर मुख्य शिखरा-पेक्षा कमी उंचीची शिखरे. गया येथील बुद्ध मंदिर,
काश्मीर उपशैली : गोथिक शैलीचा मोठा प्रभाव.दगडी भिंती, खांब, त्रिकोणी वा अर्धगोलाकृती कमानी, छप्पर व घुमट. सर्व दगडाचे.स्तंभ हेलेनिक,छप्पर पिरॅमिड पद्धतीचे. देवगड येथील मार्तंड मंदिर.
कलिंग (ओरिसा) उपशैली : एकापुढे एक चार दालने : अर्पणगृह, नृत्यशाला, प्रार्थनागृह व गाभारा. यांनाच भोगमंदिर, नटमंदिर, जगमोहन आणि देऊळ असेही म्हणतात. भोवती तट व त्यात लहान लहान मंदिरे.गाभाऱ्यावर उंच शिखर, इतर तीनांवर कमी उंचीची शिखरे.. बाह्यांगावर नक्षीकाम, आंतरभागात नाही. बहुधा खांब नाहीत. भुवनेश्वरचे लिंगराज मंदिर.
चंदेल(बुंदेलखंडी) उपशैली : कलिंग पेक्षा फ़रक म्हणजे दालने वेगळी नाहीत तर एकमेकांना जोडलेली. अर्धमंडप,मंडप व महामंडप अशी तीन दालने सर्वांना शिखरे, सर्वत्र, शब्दश: सगळीकडे, छपरावर, भिंतींवर, खांबांवर , दरवाज्यावर मूर्ती कोरलेल्या. प्रवेशद्वारावर अलंकृत तोरण. चार कोपऱ्यात चार उपमंदिरे. खजुराहो येथील कंदरिया महादेव मंदिर.
चालुक्य व सोळंकी (राजस्थान-गुजराथ) उपशैली : मुख्य गाभारा व पुढे सभामंडप अशी दोनच दालने. शिखर खजुराहो पद्धतीचे व दालनाचे छप्पर घुमटाकृती. ( मुस्लिम वर्चस्वाचा प्रभाव ?) पाया कोनाकृती व नक्षीदार खांब, मोढेराचे सूर्यमंदिर. दिलवाडा येथील जैन मंदिरे.
उत्तर भारतीय नागर मंदिर शैली शिखर
 |
| खजुराहो मंदिर, मध्य प्रदेश |
खजुराहो मंदिर
ह्या शैलीची मंदिरे पंजाब पासून ते बंगाल पर्यंत तसेच काश्मीर आणि नेपाळ पासून ते विंध्याचल पर्यंतच्या परिसरात आढळतात. नागर शैलीच्या मंदिरांचे व्यवच्छेदक लक्षण म्हणजे आमलक. मंदिराच्या मुख्य शिखराच्या कळसाखाली चपट्या आवळ्यासारखं असतं ते. नागर शैलीचे अजून एक लक्षण म्हणजे मंदिरावर छताची थोडीशीही जागा शिल्लक न ठेवता बनवलेली एका पेक्षा अधिक शिखरे. मंदिराच्या अंतरंगातील गाभारा, अंतराळ तसेच विविध मंडप या सर्वांच्या वरून छतावर वेगवेगळ्या शिखरांची योजना केलेली असते. गर्भगृहापासून ते मंदिर वास्तू प्रवेशद्वारापर्यंत हि सर्व शिखरे उंचीत उतरत्या क्रमाने असतात. गाभाऱ्यावर असते ते शिखर किंवा रेखाशिखर त्यानंतर महामंडप शिखर, मंडप / भोगमंडप शिखर, अर्धमंडप शिखर अश्या प्रकारे लहान लहान होत जाणारी शिखरे असतात. शिखरांची संख्या मात्र कमी अधिक असू शकते.
गर्भगृहाच्या छातीवरचे शिखर खालून चौकोनी असते आणि वरच्या दिशेने निमुळते होत जाते. याच्या चारही दिशांनी मध्यभागी पूर्ण आमलकापासून ते शिखराच्या तळापर्यंत एक कलाकुसरयुक्त पट्टी असते तिला मूलमंजिरी किंवा रहपग किंवा लॅटिन म्हणतात. मूलमंजिरीच्या दोन्ही बाजूंना हिच्या पेक्षा कमी उठावदार नक्षिदार पट्ट्या असतात त्यांना रथ म्हणतात.
अजून एक वैशिष्ट्य म्हणजे रेखाशिखराच्या चारही बाजूच्या अंगावर मूळ शिखरावर लहान उंचीचे शिखर असते त्याला उरुशृंग म्हणतात. ह्या उरुशृंगावर अजून एक अजून लहान उंचीचे शिखर असते त्याला प्रत्यंग म्हणतात. ह्या प्रकारचे शिखर आपल्याला भीमाशंकर मंदिर तसेच राजस्थान आणि गुजराथेतील मंदिरांवर सहजपणे बघता येते.
नागर शैली :
तिसरे ते सहावे शतक... साधी, प्राथमिक पायरीची, प्रायोगिक मंदिरे. तिगवा, देवगड, भुमरा, नाचणा, मध्यप्रदेश. गोप..सौराष्ट्र एहोळे..कर्नाटक.
गुजराथ ..सोळंकी...दहावे ते बारावे शतक.. मोढेरा सूर्यमंदिर,... झालावाड जिल्हा सेजकपूर मंदिर. अबू..जैन मंदिरे.
मध्यभारत ... दहावे-अकरावे शतक... चंदेल..खजुराहो. भेडाघाट .. चौसष्ट योगिनी. ग्वाल्हेर (तेली मंदिर व सास-बहू)
ओरिसा ... तेरावे शतक ..गंग राजवट ...कोनार्कचे सूर्यमंदिर. भुवनेश्वर, पूरी
राजस्थान ... दहावे ते बारावे ...सोळंकी ...औसिया, जगत, चितोडगड.
" " ...तेरावे शतक आणि नंतर .. चितोड..कीर्तिस्तंभ,अबु पहाड,राणकपूर,
माळवा ...(राजस्थान-महाराष्ट्र)... परमार-यादव-शिलाहार वंश..अकरावे शतक आणि पुढे .. उदयपूर, देवास, रामगड, अंबरनाथ, वलसाणे (धुळे), सिन्नर, झोडगे (नाशिक)
महाराष्ट्र ... राष्ट्रकूट...आठवे शतक वेरुळ कैलास मंदिर,(द्राविड), पट्टडकल ..जैन मंदिर
कर्नाटक .. सातव्या शतकाच्या पुढे .. चालुक्य ..पट्टडकल, एहोळे, बदामी... पापनाथ, कुकनुर..नवलिंग समुह.
" " पुढे सहाशे वर्षे .. एका राजवटीचे नाव देण्याऐवजी "कर्नाट" उपशैली म्हणा ...कुकनूर, लक्कुडी, इट्टगी.
दक्षिण भारतीय द्राविड शैली मंदिर शिखर
द्राविड शैलीची मंदिरे ही पिरॅमिड प्रमाणे खालून वर लहान लहान होत जाणाऱ्या पायऱ्यांची असतात. प्रत्येक पायरीला भूमी म्हटले जाते. प्रत्येक पायरीच्या म्हणजेच भूमीच्या कोपऱ्यांवर देवळाची लहान प्रतिकृती असते त्याला कूट म्हणतात. तसेच मध्यभागी गजपृष्ठाकृती छताचे लहान देऊळ असते त्याला शाल म्हणतात. (गजपृष्ठाकृती म्हणजे हत्तीला मागून बघत असल्याचा विचार करा त्याची पाठ आपल्याला जशी गोलाईमध्ये दोन्ही बाजूला उतरती दिसते तसेच छत बनवले जाते).
 |
| द्राविड शैली मंदिर शिखर |
द्राविड शैली मंदिराचे व्यवच्छेदक लक्षण म्हणजे शिखरावरील कलशाखाली असलेली स्तूपीका. हि स्तूपीका चौकोनी, षटकोनी किंवा अष्टकोनी असते. द्राविड मंदिरांत मंडपावरील छत मात्र पूर्ण सपाट असते, नागर मंदिरांप्रमाणे अधिकची शिखरे बनवली जात नाहीत आणि त्यामुळेच या मंदिरांचे मंडप नागर मंदीरांपेक्षा फार मोठ्या आकाराचे असतात. वेरूळच्या लेण्यांतले कैलास मंदिर हे द्राविड शैलीतले
 |
| वेरूळ, कैलास मंदिर |
द्राविड शैली :यात देवळाचा खालचा भाग चौकोनी असला तरी वरचा भाग (शिखराजवळ) अष्टकोनी वा बहुकोनी असू शकतो. या पद्धतीच्या देवालयाचे मुख्य चार भाग असे.
(१) गोपुर : प्रवेशद्वारावर उभारलेले अनेक मजली उत्तुंग शिल्प. याचे शिखर कळसासारखे नसते तर बैलाच्या डोक्यासारखे रुंद व शृंगयुक्त असते. गोपुर एक असेल किंवा अनेक असतील.
(२) मंडप : गोपुरातून आत आल्यावर देवाकडे जाण्याच्या मार्गात उभारलेले ,अलंकृत स्तंभ असलेले शिल्प.
(३) विमान : गाभारा व शिखर मिळून मुख्य देऊळ होते. त्याला विमान म्हणतात.
(४) छत्र्या किंवा घुमट्या असलेल्या वेदिका.
गाभाऱ्यावर लांबी-रुंदी-उंची कमी कमी होत गेलेल्या मजल्यांचे निमुळते शिखर असते.प्राकारात तळी, विहिरी, अग्रशालाही आढळतात. गुप्त साम्राज्याच्या उत्तर काळात बांधल्या गेलेल्या देवळांवरून ही पद्धती सुरू झाली असावी, अंतर्बाह्य सजावट आणि टोलेजंगपणा वाढत गेला. सातवे शतक ते सोळावे शतक या काळात ह्या शैलीची भरभराट झाली. गुहामंदिरे व एकपाषाणी देवळे (रथ) हेही या काळातलेच. मग गुहामंदिरे व रथ मागे पडले व त्यांच्या सारखीच विशाल मंदिरे निर्माण करावयास सुरवात झाली. कांचीपुरम येथील कैलास व वैकुन्ठ पेरुमल मंदिर
आपण मागे पाहिले की शिखर तयार होतांना भूमी (मजले) तयार होतातच. यावर निरनिराळ्या पद्धतीची सजावट केली जाते. मूर्ती, कलश, शाला, गवाक्षे, पट्ट,रथ यांनी भूमी सजवली जाते. नागर शैलीत ही सर्व एकावर एक, एका रेषेत येतात. भिंतीपासून तुमची नजर थेट आमलकापर्यंत पोचते. द्राविड शैलीत तसे नसते. प्रत्येक मजला पृथक पृथक नजरेस येतो. सहज लक्षात येणारा फरक.
तसे काही तांत्रिक भेदभाव आहेतच. पण ते लक्षात ठेवावयास पहिल्या लेखात दिलेले पारिभाषिक शब्द ध्यानात राहिले पाहिजेत व प्रत्यक्ष मंदिर बघतांना तेवढा वेळ देता आला पाहिजे. काही बघू. पण हा भाग तुम्ही सोडून दिलात तरी बिघडत नाही.
(१)छपराची जागा नागर मंदिरात त्रिकोणिकांनी घेतली आणि द्राविड मंदिरात मकरतोरणांनी.
(२) गाभारा, अर्धमंडप व मंडप यांच्या भिंतीचा मिळून जो एक सलग पट्टा तयार होतो त्यात अर्धस्तंभ, स्तंभ यांनी कवाडे करून त्यात मूर्ती बसवणे वा जाळी बसवणे द्राविड मंदिरात आढळते, नागर शैलीतील मंदिरात नाही. कोनाडे आहेत पण ते अर्धस्तंभांमुळे तयार झालेले नाहीत. नंतरच्या मंदिरात मूर्ती सरळ भिंतींवरच बसवल्या आहेत.
(३) नागर मंदिरात कणी,कुंभ अशा थरांची मांडणी दिसते,त्यावर कपोत, त्यावर भूमी व वर शिखर. द्राविड मंदिरात भिंतीच्या माथ्यवर कपोत, कपोतावर कूटशाला यांचे हार व त्यावर विमान व मग शिखर.
(४) प्रगत अवस्थेमध्ये दोनही शैलीतील स्तंभांमध्ये फरक असतो.
(५) दोन्ही शैलीत सौंदर्यकल्पना भिन्न आहेत. नागर शैलीत सर्व आखणी अशी असते की तुम्हाला वास्तु खूप उंच दिसावी तर द्राविड शैलीत विस्ताराला महत्व देण्यात आले. अनुक्रमे "ऊर्ध्ववृत्ती" व "समतलवृत्ती". द्राविड शैलीत प्रात्येक मजल्याच्या पृथक आविष्काराला महत्व दिलेले असते. नागर शैलीत तुमची नजर भिंतीपासून थेट आमलकाकडे खेचली जावी असा प्रयत्न असतो,
(६) असले फरक कितीही असले तरी एका गोष्टीत अजिबात भेद नाही. ती म्हणजे भक्त व देव यांची जवळीक. गाभारा-प्रदक्षिणामार्ग-मंडप सगळीकडे सारखेच, हा भारतीय मंदिराचा अविभाज्य भाग.
(अवांतर : भारतात हिंदु मंदिरात भक्त व देव एका पातळीवर असतात, तुम्ही देवाला "भेटू" शकता, गळामिठी घालू शकता पण ख्रिस्ती चर्चमध्ये येसू बर्याच वेळी भक्तापासून दूर, उंचावर असतो, तो "आकाशातल्या बापाचा" लेक म्हणून तर असे नाही ना ! )
द्राविड शैली
कर्नाटक .. सातवे-आठवे शतक ..बदामी.पट्टडकल ..मालेगिती, विरुपाक्ष
वरंगळ ..काकतीय वंश ..बारावे-तेरावे शतक ..हनमकोंड, पालमपेट, वरंगळ,
होयसाळ वंश ..(द्राविड-नागर शैलींचे मिश्रण) ..बारावे-तेरावे शतक ...हळेबिड, बेलुर, सोमनाथपुर.
तामिळनाडू ..पल्लव वंश ..सहावे-आठवे शतक ..महाबलिपुरम, कांचीपुरम.
" " .. चोळ वंश ...दहावे-बारावे शतक .. तंजावर,गंगैकोंड,धारासुरम. या पाद्धतीची मंदिरे सतराव्या-अठराव्या शतकांपर्यंत चालू राहिली
तिरुवल्लर, श्रीरंगम, चिदंबरम, रामेश्वर, मदुरा, विजयनगर, ताडपत्री.
वेसर मंदिर शैली :-
वेसर मंदिर शैली म्हणजे उत्तर भारतीय नागर आणि दक्षिण भारतीय द्राविड शैलीचा सुरेख संगम आहे. नागरशैलीचं वैशिष्ट्य म्हणजे उंच आणि अतिशय सुंदर दिसणारे रेखाशिखर म्हणजेच गर्भगृहाच्या छतावरचे शिखर पण या मंदिरांची अडचण एकच ती म्हणजे लहानसा मंडप. नागर मंदिरांचा मंडप लहान का असतो याचा उहापोह वरती आधीच केलेला आहे. प्राचीन काळी मंदिरे हि सामाजिक केंद्रे होती राजाला किंवा गावाला कोणत्याही कार्यक्रमाच्या आयोजनांसाठी मंदिरेच उपयुक्त वाटत, पण मग आता मंडप लहान असल्यावर तिथे आयोजित होणाऱ्या कार्यक्रमांच्या आयोजनावर, सहभाग नोंदवणाऱ्या लोकांच्या संख्येवर विपरीत परिणाम होइ. आता याचा इलाज काय करावा तर या मंदिरांच्या स्थपतींनी त्यासाठी दक्षिण भारतातील मंदिरांकडे पाहिले. द्राविड शैलीच्या मंदिराचा मंडप आकाराने फार मोठा असतो किंवा मंदिर बांधणाऱ्याला गरज वाटल्यास कमी अडचणीत मोठा मंडप सहज बांधला जाऊ शकतो. मध्य भारतातील मंदिर स्थपती नागर आणि भूमीज मंदिर शिखरांच्या प्रेमात होते त्यांनी मंदिरांच्या गर्भगृह छतांवर उंचच उंच नागर आणि भूमिज शिखरे उभी केली मात्र मंडपाची छते दक्षिणेकडील पद्धतीसारखी सपाट बनवायला सुरवात केली. हीच उत्तर आणि दक्षिण संगम शैली वेसर शैली म्हणवते. महाराष्ट्रात तसेच जास्त करून कर्नाटकात वेसर शैलीची मंदिरे आढळतात.
चालुक्यांच्या कारकिर्दीत उगम झालेल्या या शैलीत नागरर्पेक्षा द्राविड शैलीची छाप जास्त दिसते. विमान व मंडप असे दोनच भाग असतात. . लक्कुंडी, इट्टगी येथील देवालये या शैलीचे उत्कृष्ट नमुने आहेत.
होयसाळ शैली :. चालुक्य शैली पासून निघालेल्याया होयसाळ राजवटीतल्या मंदिरांचा पाया बहुकोनाकृती असतो. शिखरे द्राविड शैलीचीच असतात. फ़क्त कळस तेवढा घुमटाकार असतो व त्यावर एक छत्र असते.उंची लांबी-रुंदीच्या मानाने कमी असते. आराखडा फ़ार देखणा म्हणता येणार नाही पण ही कमतरता मूर्तीकामाने भरून काढलेली असते. अप्रतिम मूर्तीकामासाठी पहा : हळेबिड, बेलुर व सोमनाथपुर
विजयनगर शैली : होयसाळ वळण कायम ठेवून त्यात पुन्हा द्राविड शैली मिसळली की विजयनगरची शैली तयार होते.
या शैलीची सुंदर मंदिरे आपणास पहावयास मिळतील : हंपी, वेलोर, कांची, कुम्भकोणम व श्रीरंगम येथे.
याशिवाय ११ ते १३ व्या शतकांत प्रचलित असलेल्या अजूनही काही उपशैली प्रामुख्याने आढळतात;
C. मध्य भारतातील वेसर शैली
D. भूमिज मंदिर शैली
E. फांसणा शिखर शैली
वरीलपैकी भूमिज शैली ही नागर शैलीचेच एक रूप आहे तर वेसर ही नागर आणि द्राविड शैलीचे मिश्रण आहे. फांसणा ही वेगळी मंदिर शैली असण्यापेक्षा वेगळी शिखर शैली आहे असे म्हटले पाहिजे. या मंदिर शैलींबद्दल अभ्यासताना अजून एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे ती म्हणजे वेगवेगळ्या प्रांतातील भूगोलाचा, वेगवेगळ्या राजघराण्यांचा भरपूर प्रभाव मंदिरांच्या बांधणीवर झालेला दिसतो. जसा संगीतामध्ये सूर सगळे तेच असतांना सुद्धा गायकीची वेगवेगळी घराणी असतात तसंच येथेही आहे. त्यामुळे गुजराथेतली मंदिरं आणि ओडिशा मधली मंदिरं सगळी नागरचं, पण मंदिरांमधलं वेगळेपण दिसून येत. मंदिरांचे प्रकार ओळखण्यासाठी साधारणपणे त्या मंदीरांची शिखरे बघितली जातात. मंदिर शिखरांत असलेल्या वैविध्यावरून त्या मंदिराचा प्रकार ठरवलं जातो.
फांसणा शिखर
श्री क्षेत्र महाबळेश्वर मंदिर
फांसणा हि मंदिर शैली असण्यापेक्षा फक्त एक शिखर पद्धती आहे. नागर तसेच द्राविड दोन्हीप्रकारच्या मंदिरांमध्ये हि शिखरे आढळतात. साधारण लहान मंदिरांचे शिखर अश्या प्रकारचे असते. हि शिखरे उतरत्या पायऱ्यांसारखी असतात. पिरॅमिड प्रमाणेच खालून वर निमुळत्या होत जाणारी आणि लहान लहान होणाऱ्या पायऱ्यांची, मात्र या पायऱ्यांवर कूट किंवा शाल दिसत नाहीत. अश्या प्रकारचे शिखर आपल्याला महाबळेश्वराच्या मंदिरावर दिसते. काही ठिकाणी मंदिराचे मुख्य शिखर सोडून बाकी मंडप शिखरे या प्रकारची असतात जसे कि अंबरनाथच्या महादेव मंदिरात दिसते. या शिखराच्या कलाशाखाली जर आमलक असले तर ते मंदिर नागर समजावे आणि जर स्तूपीका असेल तर द्रावीड.
मध्य भारतातील भूमिज मंदिर शैली शिखर
 |
| सिन्नरचे गोंदेश्वर महादेव मंदिर |
महाराष्ट्रात भरपूर संख्येत आढळणारी मंदिरे हि भूमिज प्रकारची आहेत. वर म्हटल्या प्रमाणे भूमिज ही नागर शैलीची उपशैली आहे. त्यामुळे रेखशिखर, मंडप शिखर, अर्धमंडप शिखर वगैरे सर्व असतात ह्या मंदिरांच्या छतावरही मात्र रेखा शिखराची बांधणी थोडीशी वेगळी असते. ह्या मंदिरांवर उरुशृंग आणि प्रत्यंग आढळत नाही त्याऐवजी आमलकापासून ते शिखराच्या तळापर्यंत मूलमंजिरीची नक्षीदार पट्टीका असते. मुख्य लक्षण म्हणजे शिखराच्या प्रत्येक दोन बाजूंच्या मूलमंजिरींच्या लतांच्या मधल्या भागात मूलमंजिरीच्या लघुरूपातल्या आणि खालून वरच्या दिशेने लहान लहान होत जाणाऱ्या प्रतिकृतीच्या उभ्या रांगा असतात. एका रांगेत एका वर एक अश्या ५,७ क्वचित ९ असतात आणि अश्या ३ किंवा ५ उभ्या रांगा असतात. या रांगांना कूटस्तंभ म्हणतात. रतनवाडीच्या अमृतेश्वर मंदिराच्या शिखरावर जिथे आपल्याला ३ कूटस्तंभ बघायला मिळतात तिथेच अंबरनाथचे महादेव मंदिर, सिन्नरचे गोंदेश्वर मंदिरांच्या शिखरांवर ५ कूटस्तंभ आहेत. महाराष्ट्रातील सर्वांत जुने भूमिज मंदिर हे अंबरनाथ चे शिव मंदिर आहे. शिलाहारांच्या शिलालेखाद्वारे हे म्हणता येते कि हे मंदिर इ.स. १०६० मधेच बांधून पूर्ण झाले होते.
वेसर मंदिर शैली शिखर
 |
| वेसर शैली मंदिर शिखर |
आता थोडी माहिती "उपशैल्यां"बद्दल. वर सांगितले आहेच की निरनिराळ्या राजवटींनी, निरनिराळ्या काळांत, निनिराळ्या राज्यांत मंदिरे उभी केली व त्यांत काही बदल आढळले तर त्या मंदिरांना त्या राजवटींच्या उपशैलीची म्हणावयास सुरवात झाली.
(1) पट्टडकल :पापनाथ मंदिर. येथे नागर व द्राविड शैलीची मंदिरे शेजारी शेजारी दिसतात तसेच दोहोंची सांगड घातली तर कसे दिसेल तेही बघितले गेले. या फोटोत गाभार्याचे शिखर नागर तर शेजारचा मंडप लांबच लांब द्राविड पद्धतीचा. त्याचे छप्पर सपाट आहे. खालच्या नागर देवळात मंडपावर शिखर दिसत आहे.


(२) होयसाळ शैलीचे सोमनाथपुर येथील मंदिर. येथे नागर पद्धतीचे शिखर आहे पण एकूण ठसा बसकट, द्राविड पद्धतीचाच.

(३) खजुराहो येथील कंदरिया महादेव मंदिरात ऊर्धगामी रेषा आपली नजर थेट आमलकाकडे घेवून जातात.

विटांची मंदिरे :- मंदिर बांधणीच्या उपक्रमांमध्ये सुरुवातीला विटांची मंदिरे बांधली गेली. पण शतकानुशतक टिकून राहण्याच्या दृटीने वीट नाशिवंत असल्याने सुरुवातीच्या कालखंडातील विटांची मंदिरे आजमितीस फारच कमी प्रमाणात आढळतात. मांढाळ, रामटेक, तेर येथिल विटांची मंदिरे आजही पाहावयास मिळतात.
हेमाडपंथी मंदिरे :- यादवांच्या काळात १३व्या शतकात हेमाडपंत किंवा हेमाद्री पंडित हा प्रधानमंत्री होता. यादवराजे हे शंकराचे निस्सीम भक्त असल्या कारणाने त्यांच्या आज्ञेने हेमाडपंताने संपूर्ण यादव साम्राज्यात शिव मंदिरे बांधविली.
हेमाडपंतांविषयी अनेक स्थानिक लोककथा प्रसिद्ध आहेत. त्यापैकी एक अशी:
हेमाडपंतांच्या जन्माच्या वेळेस त्यांच्या आईचा बाळंतपणात मृत्यू झाला. पोरका हेमाद्री अतिशय प्रतिभावान आणि विद्वान होता. त्याने भाषा आणि विविध शास्त्रांत प्रावीण्य प्राप्त केले. वैद्यकशास्त्रात त्याचा हात धरणारा दुसरा कोणी नव्हता. असे सांगतात की रावणाचा भाऊ बिभीषण आजारी असताना हेमाद्रीने त्याची शुश्रूषा केली आणि त्याच्या बदल्यात प्रसन्न होऊन बिभीषणाने हेमाद्रीला वर मागण्यास सांगितले. लंकेच्या समृद्धीवर भाळलेल्या हेमाद्रीने लंकेसारखी मंदिरे राक्षसांकरवी आपल्या प्रदेशात बांधण्याचा वर मिळवला आणि बिभीषणाने तो आनंदाने देऊ केला. मात्र त्याने एक अट घातली. ती अशी की राक्षस फक्त एकच रात्र काम करतील. दर्जा भरून केलेले बांधकाम नसल्याने हेमाडपंतांनी एका रात्रीत सर्व मंदिरे उभी केली. या आख्यायिकेबरोबरच हेमाडपंत श्रीलंकेतून लिपी शिकून आल्याची दुसरी एक आख्यायिका ऐकायला मिळते. हीच लिपी मोडी म्हणून प्रसिद्ध झाल्याचे कळते. परंतु मोडी ही शिकस्ता या फारशी लिपीवरून अस्तित्वात आल्याचा दुसरा मतप्रवाहही दिसतो।
आख्यायिका बाजूला सारून ऐतिहासिक हेमाडपंतांचा शोध घेतला असता हेमाद्री पंडित हे यादवांच्या काळातील मुख्य प्रधान होते असे दिसून येते. यादव राजे महादेव (इ. स. १२६०-७०) आणि रामचंद्र (इ. स. १२७१-१३०९) यांच्या काळातील हे अतिशय विद्वान मंत्री असावेत. यादव साम्राज्याचे ते प्रधान, मुख्य सचिव असल्याने आणि याचबरोबर जमिनीची पाहणी करून महसूल ठरवणे, तो वसूल करणे, उत्पन्न ठरवणे इ. हेही करत असल्यामुळे त्यांना "श्रीकरणाधिप" (जमाबंदीचे प्रमुख) या पदवीनेही ओळखले जाते.
हेमाडपंतांचा जन्म द. कर्नाटकात एका ब्राह्मण कुटुंबात झाला. त्यांच्या वडिलांचे नाव कामदेव होते. पुढे ते कर्नाटक सोडून महाराष्ट्रात स्थायिक झाल्याचे कळते. हेमाडपंत संस्कृत भाषेचे गाढे अभ्यासक तर होतेच, परंतु लेखक, कवी, स्थापत्यशास्त्रज्ञ आणि धन्वंतरीही होते. यादवांच्या दरबारातील एक विद्वान मुत्सद्दी म्हणून त्यांची गणना होते. धर्मशास्त्रावरील चर्तुर्वग चिंतामणी हा ग्रंथ, आयुर्वेदरसायन हे वाग्भटाच्या अष्टांगहृदय या ग्रंथावरील भाष्य, आणि इतरही अनेक साहित्यनिर्मिती त्यांनी केल्याचे सांगितले जाते. मराठी भाषेसाठी देवनागरीपूर्वी वापरण्यात येणार्या मोडी लिपीचा शोधही त्यांनी लावल्याचे सांगितले जाते. इतिहासाचार्य वि. का. राजवाडे व डॉ. भांडारकरांच्या मते ही लिपी हेमाडपंत श्रीलंकेतून घेऊन आल्याचे सांगितले जाते, परंतु इतर तज्ज्ञ ते ग्राह्य मानत नाहीत।
हेमाड स्वतः अनेक शास्त्रांत निपुण होता त्याने त्याकाळी महाराष्ट्रात प्रसिद्ध पावलेल्या नागर आणि भूमिज शैलींचा वापर मंदिरे बांधण्यासाठी केला, मात्र त्याने बांधकामाची स्वतःची वेगळी शैली विकसित केली होती. सामान्यतः इमारत बांधणीत घडवलेल्या दगडांमध्ये चुना किंवा त्याप्रकारचा दर्जा न भरता दगडच वेगवेगळ्या कोनातून कापून, त्यांनाच खुंट्या आणि खाचा पाडून ते एकमेकांत घट्ट बसू शकतील अशी रचना केली जाते. मंदिरांसारख्या वास्तूत पायापासून शिखरापर्यंत ही दगड एकमेकांत गुंफून केलेली रचना एकसंध उभी राहाते आणि टिकाऊही बनते. हा वास्तुरचना आणि कौशल्याचा स्वतंत्र प्रकार आहे.याचे वैशिष्ट्य असे की, या वास्तूच्या उभारणीत सांधे जोडण्यससाठी चुना, माती वापरले जात नाही. मंदिरे विविध प्रकारच्या म्हणजेच त्रिकोणी, चौकानी, वर्तुळाकृती, अर्धवर्तुळाकृती इत्यादी आकाराच्या दगडांनी बांधली जात असत. या दगडांना विशिष्ट ठिकाणी खोबणी असत, त्यांच्या सहाय्याने हे दगड एकमेकांवर बसवून संपूर्ण वास्तू उभी केली जात असे.स्थापत्यशास्त्रात हेमाडपंतांनी चुना किंवा मातीचा दर्जा न भरता मध्यम आकाराचे दगड कापून, खालच्या दगडात खड्डा करून वरील दगडाची खुंटी एका विशिष्ट कोनात खालच्या दगडाच्या खड्ड्यात बसवून घडीव वास्तू बांधण्याची कलाही प्रसिद्ध केली. हे दगड तासून त्यावर कोरलेल्या शिल्पाकृती तत्कालीन संस्कृतीचे आणि कलाविष्काराचे उत्तम नमुने आहेत. थोड्याशा परावर्तित प्रकाशातही मंदिराच्या वास्तुयोजनेतील सौंदर्य कायम ठेवल्याचे दिसते आणि संपूर्ण वास्तूच्या उंचीचा किंवा वर झेपावत जाणार्या स्थापत्याच्या प्रभाव पडणे हे या मंदिर रचनांचे वैशिष्ट्य मानले जाते।
या पद्धतीत पायाची आखणी ज्या आकाराची असेल, नेमकी त्याच आकाराची लहान आकृती शिखरावरील आमलकाची बैठक असते. पायाची आखणी अनेक कोनबद्ध असते. शिखराच्या छोट्या छोट्या प्रतिकृती खालपासून वरपर्यंत एकीवर एक प्रमाणशीर पद्धतीने बसवल्यामुळॆ लहान लहान शिखरे रचून मोठे शिखर तयार केले असे वाटते.ही शिखरे जागच्या जागी रहावीत म्हणून उपयोगात आणलेल्या दगडांवर नक्षीकाम करून उठाव आणतात.शिखरांमध्ये अनेक प्रकार असून अश्वथर, गजथर इत्यादी प्रकार प्रामुख्याने वापरतात. ही शिल्पपद्धती हेमाडपंताच्या नावाने प्रसिद्ध असली तरी अशा प्रकारची देवळे त्याच्या काळाच्या आधीपासून आढळतात. निलंगे व नारायणपूर येथी या प्रकारची देवळे आहेत. हेमाद्रीचे नाव देवळे बांधावयाच्या पद्धतीवरून पडले आहे. त्यामुळे अशी देवळे नागर वा द्राविड या दोनही शैलीत बांधता येणे शक्य आहे. बांधकाम करण्यासाठी चुना, माती न वापरल्याने या मंदिरांचे बांधकाम कोरडे आहे. दगडांवरील सुबक शिल्पकला आणि पटईची छते या मंदिरांना एक आगळे रूप प्रदान करतात. या मंदिरांची बांधकामे यादव काळात सुरू झाली असावी असा सर्वसाधारण समज दिसतो. तज्ज्ञांच्या मते यादव काळापूर्वीही अनेक वर्षे असे बांधकाम झाल्याचे आढळते. उत्तरेत कोरड्या बांधकामाची मंदिरे बांधण्याची प्रथा पूर्वापार होती आणि बदामीच्या चालुक्यांच्या काळातही अशी मंदिरे बांधली गेल्याचे सांगितले जाते. पण हे बांधकाम फार मोठ्या प्रमाणात झालेले नसावे आणि महाराष्ट्रात त्याचा प्रसार झालेला नसावा असे मानले जाते. आधी सांगितल्याप्रमाणे त्याच्या काळाच्या आधीही अशी देवळे बांधत होतेच. त्याचे स्वत:चे वास्तव देवगिरीला, महाराष्ट्रात असल्याने बरीच देवळे नागरी पद्धतीची आढळतात. विदर्भात, वर्हाडात, जयपुर-कोटली, अमदापूर,शिरपूर, मेहेकर,लोणार, धोत्रा, सातगाव (जि.बुलढाणा)येथील देवळे बर्यापैकी स्थितीत आहेत. आंध्र प्रदेशातील देवळे या पद्धतीची आहेत पण त्यांचा संबंध हेमाद्रीशी जोडणे अवघड आहे. परंतु यादव काळात आणि त्या नंतर हेमाडपंती बांधकामाचा मोठ्याप्रमाणात प्रसार झाल्याचे दिसते. याचे एक मुख्य कारण मूर्तिभंजक मुसलमानांचा महाराष्ट्राला होणारा उपद्रव हे असावे. हेमाडपंती मंदिरे पक्क्या बांधकामाची नसल्याने ही मंदिरे झटकन उभारणे शक्य होत असावे. अर्थातच, दर्जा भरून पक्के बांधकाम नसल्याने सद्यस्थितीत ज्या मंदिरांचा जीर्णोद्धार झाला नाही ती मोडकळीला आलेल्या अवस्थेत दिसतात. भूकंप, पूर, पावसाच्या मार्याने होणारी झीज, दगडांच्या भेगांतून पसरत जाणार्या झाडाझुडपांनी मंदिरांची दुर्दशा केली आहे.
 |
| हरिश्चंद्रेश्वर महादेव मंदिर, हरिश्चंद्रगड |
आपल्याकडे प्राचीन दिसणारे कोणतेही मंदिर हेमाडपंथी मंदिर म्हटले जाते, पण हे चुकीचे आहे हेमाद्री पंडितांच्या शेकडो वर्ष आधीही महाराष्ट्रात उत्कृष्ट प्रकारची मंदिरे बनवली जात होती. हेमाडपंती स्थापत्यशैली मध्ये बनवलेली बरीच मंदिरे महाराष्ट्रात आहेत. जसे की रतनवाडीचे अमृतेश्वर मंदिर, औंढा नागनाथमंदिर, इत्यादी. अशा अनेक मंदिरांच्या निर्मितीमुळे यादव साम्राज्याच्या आधीही अस्तित्वात असणाऱ्या या स्थापत्यकलेला हेमाडपंतांच्या काळात अनन्यसाधारण महत्त्व प्राप्त झालेले दिसते. या शैलीचे प्रसिद्ध उदाहरण म्हणून वेरूळच्या घृष्णेश्वर मंदिराचे नाव घेता येईल आणि हेमाडपंती स्थापत्याचा उत्कृष्ट नमुना म्हणून नाशिकजवळील गोन्देश्वर मंदिराचे नाव घेता येईल.
प्राचीन भारतात दैवतांची भव्य देवळे बांधण्याची प्रथा गुप्त राजवटीत
(इ.स.३२० ते ५५०) सुरू झाली असे मानले जाते. गुप्त कालापासून आजतागायत
भारतातील विविध प्रांतात विविध धाटणीची देवळे उभी राहिल्याचे दिसून येते.
स्थानिक स्थापत्यशास्त्र, शिल्पकला, कलाकुसर वगैरेंचा या देवळांच्या
बांधकामावर मोठा प्रभाव दिसतो. स्थापत्यशास्त्राचे हे पुरावे तत्कालीन
संस्कृतीची ओळख आणि माहिती करून देण्यात महत्त्वाची भूमिका बजावतात.
खजुराहो, कोणार्क, हम्पी आणि चालुक्यांची बदामी येथील मंदिरे त्यांच्या
स्थापत्य आणि शिल्पकामांसाठी विशेष प्रसिद्ध आहेत आणि पर्यटनस्थळेही गणली
जातात।
महाराष्ट्रातही अतिशय सुंदर, घडीव आणि अप्रतिम शिल्पकामाने
सजवलेली प्राचीन मंदिरे अस्तित्वात आहेत याची माहिती अनेकांना नसते.
महाराष्ट्रात प्रामुख्याने दगडी बांधकामाची आणि अप्रतिम कोरीव नक्षीकामाने
सजवलेली जी देवळे दिसतात ती बरेचदा हेमाडपंती या नावाने ओळखली जातात.
वेरूळचे घृष्णेश्वराचे मंदिर, अंबरनाथचे शंकराचे मंदिर, नाशिकजवळील
गोंदेश्वर मंदिर, गोदावरीच्या तीरावरील मंदिरे, कोल्हापूरच्या अंबाबाई
मंदिराचा कळस, ज्योतिबाच्या डोंगरावरची देवळे, शिखर शिंगणापूरचा शंभू
महादेव, रतनवाडीचे अमृतेश्वर मंदिर, तुळजापूरचे मंदिर, त्र्यंबकेश्वराचे
मंदिर इत्यादी. हेमाडपंती पद्धतीत थोडा बदल करून सासवडचा संगमेश्वर व
वटेश्वर, धावडशी येथील परशुरामाचे आणि पालीचे खंडोबाचे देऊळ इ. मंदिरे
बांधली आहेत. विदर्भाच्या सर्व जिल्ह्यांत हेमाडपंती मंदिरे आहेत. हयहैय,
यादव, चालुक्य हे त
त्कालीन राजे शिवभक्त असल्याने महाराष्ट्रात हेमाडपंती बांधणीची शिवमंदिरे प्रामुख्याने दिसतात.
चुन्याचा
दर्जा न भरता घडीव दगडांवर दगड रचून तयार केलेली वास्तू हे हेमाडपंती
मंदिरांचे वैशिष्ट्य मानले जाते. बांधकाम करण्यासाठी चुना, माती न
वापरल्याने या मंदिरांचे बांधकाम कोरडे आहे. दगडांवरील सुबक शिल्पकला आणि
पटईची छते या मंदिरांना एक आगळे रूप प्रदान करतात. या मंदिरांची बांधकामे
यादव काळात सुरू झाली असावी असा सर्वसाधारण समज दिसतो. तज्ज्ञांच्या मते
यादव काळापूर्वीही अनेक वर्षे असे बांधकाम झाल्याचे आढळते. उत्तरेत कोरड्या
बांधकामाची मंदिरे बांधण्याची प्रथा पूर्वापार होती आणि बदामीच्या
चालुक्यांच्या काळातही अशी मंदिरे बांधली गेल्याचे सांगितले जाते. पण हे
बांधकाम फार मोठ्या प्रमाणात झालेले नसावे आणि महाराष्ट्रात त्याचा प्रसार
झालेला नसावा असे मानले जाते. परंतु यादव काळात आणि त्या नंतर हेमाडपंती
बांधकामाचा मोठ्याप्रमाणात प्रसार झाल्याचे दिसते. याचे एक मुख्य कारण
मूर्तिभंजक मुसलमानांचा महाराष्ट्राला होणारा उपद्रव हे असावे. हेमाडपंती
मंदिरे पक्क्या बांधकामाची नसल्याने ही मंदिरे झटकन उभारणे शक्य होत असावे.
अर्थातच, दर्जा भरून पक्के बांधकाम नसल्याने सद्यस्थितीत ज्या मंदिरांचा
जीर्णोद्धार झाला नाही ती मोडकळीला आलेल्या अवस्थेत दिसतात. भूकंप, पूर,
पावसाच्या मार्याने होणारी झीज, दगडांच्या भेगांतून पसरत जाणार्या
झाडाझुडपांनी मंदिरांची दुर्दशा केली आहे.

यादव
राजे कलाप्रेमी असल्याने हेमाडपंती धाटणीची अनेक मंदिरे या काळात निर्माण
झाली. त्यांची धाटणी, शिल्पकाम, बांधकाम यांत कमालीचे साम्य आढळते आणि
तरीही प्रत्येक मंदिराचे आपले स्वत:चे वेगळे वैशिष्ट्य दिसून येते. या
मंदिराचे स्थापत्यकार हेमाडपंत यांच्या अभियांत्रिकी कौशल्याचे कौतुक करावे
तेवढे थोडे असले तरी या युगपुरुषाबद्दल फारशी माहिती महाराष्ट्राला नाही.
हेमाडपंत
हेमाडपंत हे हेमाद्री पंडित या नावानेही ओळखले जातात. हेमाडपंतांविषयी अनेक स्थानिक लोककथा प्रसिद्ध आहेत. त्यापैकी एक अशी:
हेमाडपंतांच्या
जन्माच्या वेळेस त्यांच्या आईचा बाळंतपणात मृत्यू झाला. पोरका हेमाद्री
अतिशय प्रतिभावान आणि विद्वान होता. त्याने भाषा आणि विविध शास्त्रांत
प्रावीण्य प्राप्त केले. वैद्यकशास्त्रात त्याचा हात धरणारा दुसरा कोणी
नव्हता. असे सांगतात की रावणाचा भाऊ बिभीषण आजारी असताना हेमाद्रीने त्याची
शुश्रूषा केली आणि त्याच्या बदल्यात प्रसन्न होऊन बिभीषणाने हेमाद्रीला वर
मागण्यास सांगितले. लंकेच्या समृद्धीवर भाळलेल्या हेमाद्रीने लंकेसारखी
मंदिरे राक्षसांकरवी आपल्या प्रदेशात बांधण्याचा वर मिळवला आणि बिभीषणाने
तो आनंदाने देऊ केला. मात्र त्याने एक अट घातली. ती अशी की राक्षस फक्त एकच
रात्र काम करतील. दर्जा भरून केलेले बांधकाम नसल्याने हेमाडपंतांनी एका
रात्रीत सर्व मंदिरे उभी केली. या आख्यायिकेबरोबरच हेमाडपंत श्रीलंकेतून
लिपी शिकून आल्याची दुसरी एक आख्यायिका ऐकायला मिळते. हीच लिपी मोडी म्हणून
प्रसिद्ध झाल्याचे कळते. परंतु मोडी ही शिकस्ता या फारशी लिपीवरून
अस्तित्वात आल्याचा दुसरा मतप्रवाहही दिसतो।
आख्यायिका बाजूला सारून
ऐतिहासिक हेमाडपंतांचा शोध घेतला असता हेमाद्री पंडित हे यादवांच्या
काळातील मुख्य प्रधान होते असे दिसून येते. यादव राजे महादेव (इ. स.
१२६०-७०) आणि रामचंद्र (इ. स. १२७१-१३०९) यांच्या काळातील हे अतिशय विद्वान
मंत्री असावेत. यादव साम्राज्याचे ते प्रधान, मुख्य सचिव असल्याने आणि
याचबरोबर जमिनीची पाहणी करून महसूल ठरवणे, तो वसूल करणे, उत्पन्न ठरवणे इ.
हेही करत असल्यामुळे त्यांना "श्रीकरणाधिप" (जमाबंदीचे प्रमुख) या पदवीनेही
ओळखले जाते.
हेमाडपंतांचा जन्म द. कर्नाटकात एका ब्राह्मण कुटुंबात
झाला. त्यांच्या वडिलांचे नाव कामदेव होते. पुढे ते कर्नाटक सोडून
महाराष्ट्रात स्थायिक झाल्याचे कळते. हेमाडपंत संस्कृत भाषेचे गाढे अभ्यासक
तर होतेच, परंतु लेखक, कवी, स्थापत्यशास्त्रज्ञ आणि धन्वंतरीही होते.
यादवांच्या दरबारातील एक विद्वान मुत्सद्दी म्हणून त्यांची गणना होते.
धर्मशास्त्रावरील चर्तुर्वग चिंतामणी हा ग्रंथ, आयुर्वेदरसायन हे
वाग्भटाच्या अष्टांगहृदय या ग्रंथावरील भाष्य, आणि इतरही अनेक
साहित्यनिर्मिती त्यांनी केल्याचे सांगितले जाते. मराठी भाषेसाठी
देवनागरीपूर्वी वापरण्यात येणार्या मोडी लिपीचा शोधही त्यांनी लावल्याचे
सांगितले जाते. इतिहासाचार्य वि. का. राजवाडे व डॉ. भांडारकरांच्या मते ही
लिपी हेमाडपंत श्रीलंकेतून घेऊन आल्याचे सांगितले जाते, परंतु इतर तज्ज्ञ
ते ग्राह्य मानत नाहीत।
स्थापत्यशास्त्रात हेमाडपंतांनी चुना किंवा
मातीचा दर्जा न भरता मध्यम आकाराचे दगड कापून, खालच्या दगडात खड्डा करून
वरील दगडाची खुंटी एका विशिष्ट कोनात खालच्या दगडाच्या खड्ड्यात बसवून घडीव
वास्तू बांधण्याची कलाही प्रसिद्ध केली. हे दगड तासून त्यावर कोरलेल्या
शिल्पाकृती तत्कालीन संस्कृतीचे आणि कलाविष्काराचे उत्तम नमुने आहेत.
थोड्याशा परावर्तित प्रकाशातही मंदिराच्या वास्तुयोजनेतील सौंदर्य कायम
ठेवल्याचे दिसते आणि संपूर्ण वास्तूच्या उंचीचा किंवा वर झेपावत जाणार्या
स्थापत्याच्या प्रभाव पडणे हे या मंदिर रचनांचे वैशिष्ट्य मानले जाते।
अशा
अनेक मंदिरांच्या निर्मितीमुळे यादव साम्राज्याच्या आधीही अस्तित्वात
असणाऱ्या या स्थापत्यकलेला हेमाडपंतांच्या काळात अनन्यसाधारण महत्त्व
प्राप्त झालेले दिसते. या शैलीचे प्रसिद्ध उदाहरण म्हणून वेरूळच्या
घृष्णेश्वर मंदिराचे नाव घेता येईल आणि हेमाडपंती स्थापत्याचा उत्कृष्ट
नमुना म्हणून नाशिकजवळील गोन्देश्वर मंदिराचे नाव घेता येईल.
घृष्णेश्वर मंदिर
औरंगाबादजवळील
दौलताबादेपासून सुमारे ११ कि. मी. अंतरावर असणारे घृष्णेश्वराचे शिवमंदिर
हे बारा ज्योतिर्लिंगांतील एक महत्त्वाचे ज्योतिर्लिंग गणले जाते. लाल
पाषाणात अप्रतिम कोरीव काम केलेले हे मूळ मंदिर पुरातन असून, सोळाव्या
शतकात शिवाजीराजांचे आजोबा मालोजीराजे भोसले आणि त्यानंतर पुण्यश्लोक
अहिल्याबाई होळकर यांनी या मंदिराचा जीर्णोद्धार केल्याने ते अद्यापही
चांगल्या अवस्थेत आहे.
घृष्णेश्वराचे
प्राचीन मंदिर कसे अस्तित्वात आले याबद्दलही अनेक आख्यायिका प्रचलित आहेत.
एका प्रसिद्ध आख्यायिकेनुसार, घृष्मा (किंवा घृष्णा) नावाची एक शिवभक्त
स्त्री दरदिवशी शिवलिंग बनवून नंतर ते भक्तिभावाने शिवतीर्थात विलीन करत
असे. या बाईला घरात आपल्या सवतीकडून बराच जाच होता. एके दिवशी सवतीने
घृष्मेच्या मुलाला कपटाने ठार केले. दु:खाने वेडीपिशी झालेली घृष्मा
शिवतीर्थावर येऊन शंकराची पूजा करून आळवू लागली आणि त्याच शिवतीर्थातून
तिचा मुलगा पुनर्जीवित होऊन परतला. यावेळेस शंकराने तिथे उपस्थितांना दर्शन
दिले आणि गावकऱ्यांनी शंकराचे मंदिर त्या ठिकाणी बांधले, जे
घृष्णेश्वराच्या नावाने प्रसिद्ध झाले।

अहिल्याबाई
होळकर यांनी मंदिराचा जीर्णोद्धार केल्याचा शिलालेख येथे आढळून येतो.
त्यानुसार ' श्री शके १६९१ विरोधी वत्सरी माघ सुरी नाग बुध दिनी होळकर
कुलाल वाल कल्पवल्ली श्री अहिल्याबाईने श्री तीर्थराज शिवालयाचा
जीर्णोद्धार केला असे श्रीरस्तू शिवमाकल्पं' हे कोरलेले आढळते. आज सुमारे
एक एकर क्षेत्रफळात वसलेले हे मंदिर मालोजीराजे आणि अहिल्याबाईंनी केलेल्या
जीर्णोद्धारामुळे सुस्थितीत आहे. मंदिराच्या चार दिशांना चार महादरवाजे
असून चौरसाकृती शिवतीर्थासभोवती अष्टतीर्थांची आठ सुंदर आणि सुबक देवालये
येथे आहेत. शिवमंदिराचे गर्भगृह, अंतराळ आणि सभामंडप असे तीन मुख्य भाग
असून मंदिराचा आकाशाच्या दिशेने झेपावाणारा उंच कळस आणि त्यावरील अप्रतिम
कोरीव काम लक्षवेधक आहे.
गोन्देश्वर मंदिर
नाशिकपासून
सुमारे २६ कि.मी. अंतरावर सिन्नर येथील गोन्देश्वराचे मंदिर हा हेमाडपंती
स्थापत्यकलेचा आणखी एक उत्कृष्ट नमुना मानला जातो. मध्ययुगीन काळातील अतिशय
सुंदर आणि सुबक कारागिरीचा आविष्कार म्हणून गोन्देश्वर प्रसिद्ध आहे. या
मंदिराचे मूळ नाव गोविंदेश्वर असल्याचे सांगितले जाते. सुमारे सातशे
वर्षांपूर्वी सिन्नरवर यादव वंशातील राजा राव गोविंद यांचे शासन होते.
त्यांच्या कारकिर्दीत या मंदिराची निर्मिती झाल्याचा इतिहास कळतो. या
राजावरूनच मंदिराचे नाव गोविंदेश्वर पडले असावे असा अंदाज बांधला जातो तर
काही तज्ज्ञांच्या मते इ.स. ११६० मधील यादव राजा गोविंदराज याच्या नावावरून
या मंदिराचे नाव गोन्देश्वर (गोविंदेश्वर) पडले असावे असाही कयास बांधला
जातो. महाराष्ट्रात आढळणार्या मध्ययुगीन वास्तूंपैकी अत्युत्तम शिल्पकलेचा
नमुना म्हणून गोन्देश्वर मंदिराची गणती होते.
या
मंदिराचे वैशिष्ट्य म्हणजे मंदिराची वास्तू पायर्या पायर्यांनी बनलेल्या
१२५ फूट x ९५ फूट मापाच्या ओट्यावर उभी आहे. मंदिराची बांधणी अतिशय
प्रमाणबद्ध आणि सममितीत असून स्थापत्य अतिशय मोहक आहे. संपूर्ण मंदिराचा
परिसर सुमारे आठ हजार चौरस फुटांचा आहे. मंदिर पूर्वाभिमुख असून
दक्षिणेकडूनही त्याला दरवाजा आहे.
हे मंदिर इतर हेमाडपंती
मंदिरांपेक्षा किंचित वेगळे असून उत्तरेकडील नागरी मंदिरांची झाक त्यावर
दिसते. हे मंदिर पाच मुख्य मंदिरांचा समूह असल्याने त्याला शैवपंचायतन
म्हटले जाते. यांतील गोन्देश्वराचे मुख्य शिवमंदिर मध्यावर असून सभोवतीची
चार उपदिशांना असणारी मंदिरे पार्वती, गणपती, सूर्य आणि विष्णू यांची आहेत.
इतर मंदिरांपेक्षा मुख्य मंदिर थोडे उंचावर असून मंदिराचे सभामंडप आणि
गर्भगृह असे भाग आहेत. गर्भगृहावर बांधलेले आकाशाकडे झेपावणारे मंदिराचे
पट्टईचे शिखर अतिशय देखणे असून अप्रतिम कोरीव कामाने सजवलेले आहे.
गर्भगृहात रेखीव शिवपिंडी आहे. सभामंडपातील खांब नक्षीने कोरलेले असून
त्यांवर आणि मंदिरांच्या भिंतींवर देव-देवता, गंधर्व-अप्सरा, पौराणिक आणि
रामायणातील प्रसंग कोरलेले आहेत. मंदिरातील शिल्पकाम त्रिमित असून त्यावर
पडणार्या परावर्तित प्रकाशाच्या आणि सावलीच्या छटांतून मंदिराचे देखणेपण
अधिकच उठावदार दिसते।
नैसर्गिक उत्पात आणि मानवी औदासिन्यातून टिकून
राहिलेली ही मंदिरे काही स्थानिकांच्या आस्थेतून अद्याप सुस्थितीत आहेत.
कला, शिल्प आणि स्थापत्याचा हा समृद्ध वारसा असल्याचे ध्यानात आल्यावर
पुरातत्त्वखात्यानेही या मंदिरांकडे लक्ष पुरवण्यास सुरुवात केली आहे.
शासनाने या स्थळांचा पर्यटन विकास केल्यास आणि स्थानिकांनी योग्य काळजी
घेतल्यास सर्वांच्या अथक प्रयत्नांतून आणि श्रद्धेतून महाराष्ट्राला
हेमाडपंतांनी दिलेला हा वैभवशाली वारसा टिकून राहील याची खात्री वाटते।
आभार:
या लेखाला माहितीचा हातभार लावण्याबद्दल चित्तरंजन भट आणि शुद्ध मराठी
यांची आभारी आहे. संगमेश्वर, अमृतेश्वर आणि घृष्णेश्वर मंदिरांची
प्रकाशचित्रे उपलब्ध करून दिल्याबद्दल ध्रुव मुळे यांची आणि गोन्देश्वर
मंदिराचे प्रकाशचित्र उपलब्ध करून दिल्याबद्दल पराग पुरंदरे यांची अतिशय
आभारी आहे.
http://vmoti.blogspot.com/2008/11/blog-post.html
इंडो-सारासेनिक शैली :-
इंडो-सारासेनिक शैली ही भारतात इस्लामचा प्रवेश झाल्यावर उदयाला आली.परंतु या शैलीत रोमन, पर्शियन आणि मेसापोटेमियन स्थापत्याचा ही प्रभाव आहे. याला मेहराब शैली असेही म्हणतात.
इंडो सॅरासेनिक शब्दाचे दोन अर्थ दिसतात.
१. हिंदू आणि मुसलमान शैलींचा संकर करून युरोपियन स्थापत्यकारांनी निर्माण केलेल्या इमारती
२. हिंदू आणि मुसलमान शैलींचा संकर होऊन निर्माण केलेल्या (मग त्या इंग्रजांच्या पूर्वीच्या का असेनात) अशा इमारती
पूर्वीच्या शैलीला हिंदुस्तानी-मुसलमान शैली, किंवा उत्तरेकडची हिंदू-मुगल शैली, किंवा दख्खनेची बाहमनी शैली अशी सुयोग्य वर्णनात्मक नावे वापरण्यास हरकत नाही.
इस्लामला मुर्तीपुजा मान्य नसल्यामुळे या शैलीत मानवी शिल्प, पद्म,चक्र, स्वस्तिक, कलश हे दिसत नाही. त्या उलट वळणदार अक्षर आणि भौमेतिक आकृत्या असलेली नक्षी पहायला मिळते.सहाजिकच या शैलीतील मंदीर कमी दिसतात. याचे पुन्हा तीन प्रकार दिसतात. ग्रीको-रोमन, पौर्वात्य शैली ( मेसापोटेमिया आणि पार्शिया ) आणि भारतीय शैली. नागर्,द्रविड शैलीत बांधकाम केले असेल तर बांधकामाचे घटक उभे आणि आडवे असून त्याच्यामध्ये जोड दिसतात. तर इंडो सारसेनिक शैलीत मेहराब, कमानी, कक्ष, मीनार आणि घुमट दिसतात. यात असलेले वैशिष्ट्य म्हणजे १. घुमट २. मिनारांवर चढवलेल्या घुमट्या ३. ४-बाजूंची सिमेट्री, आणि चार कोपर्यातले मिनार ४. घुमटाभोवती कमळाच्या पाकळ्यांसारखी महिरप ५. बारीक-तपशील-नसलेल्या मोकळ्या भिंती
रायगडावरील शंभू महादेवाचे देऊळ (जगदीश्वर) याच पद्धतीचे आहे. दुरून पाहिल्यास ती मशीदच असावी असे भासते.-पण देवळासमोर नंदी आणि आतमध्ये मारुती आणि शिवलिंग आहे

.JPG)
भारतातील उत्तम अवस्थेत असलेली मंदीर :-
भारतातील मंदीरे म्हणले कि आपल्या डोळ्यासमोर शिल्पकामाने नटवलेले स्थापत्य येते. उदा. मदुराईचे मीनाक्षी मंदीर असो, कामशिल्पाचा अर्थ सांगणारे खजुराहोचे मंदीर असो कि नाजुक नक्षीकामाची कारागिरी मिरवणारे दिलवाडा मंदीर असो. पण विशेष नवलाईची बाब म्हणजे भारतातील सर्वात प्राचीन मंदीर हे फार कोरीवकाम नसणारे छोटेसे मध्य प्रदेशातील सांची येथील मंदीर आहे.
प्राचीन भारतातील मंदीराच्या निर्मितीचा कालखंड बघीतला तर तो इ.स. ३ ते ६ वे शतक हा गुप्त राजवटीचा काळ येतो. याचा अर्थ असा नाही कि याच्या आशी मंदीरांची उभारणी झालीच नाही. मौर्य कालखंडात इ.स. पुर्व तिसर्या शतकातील वीटा आणि दगडाचे बांधणीचे मंदीर राजस्थान मधील बैराट जिल्ह्यात सापडले आहे किंवा इ.स. पुर्व दुसर्या शतकातील वीटांनी बांधलेले लंबवर्तुळाकार मंदीराचे अवशेष मध्य प्रदेशातील विदीशा जिल्ह्यात बैसानगर येथे सापडले आहेत.
अर्थात बर्याच जुन्या मंदीरात काळानुरुप बरेच बदल आणि बांधकामात सुधारणा झाल्यामुळे त्यांचे नेमके प्राचीनत्व समजत नाही. त्यामुळे सहाजिकच सांची १७ मधील गुप्तकालीन मंदीर हेच भारतातील प्राचीन मंदीर म्हणता येईल. अर्था
त मथुरेजवळ सोंख नावाच्या गावात लंबवर्तुळाकार स्वरुपाचे मंदीराचे अवशेष सापडले आहेत, जे कदाचित कुषाण काळातील ( इ.स. ३० ते इ.स. ३७५ ) असावेत असे संशोधक डॉ. हर्बट हर्टेल मानतात. अर्थात इथे फक्त मंदीराचा पाया आहे, त्याचे बांधकाम म्हणजे भिंती नाहीत.
अर्थात गुप्त काळाच्या आधी मंदीर उभारणी होतच नव्हती असे मात्र नाही.मात्र सध्या ज्या शैलीत आणि बांधकाम साहित्याचा वापर करुन मंदीर बांधतात, त्या पध्दतीने ती बांधली जात नसावीत. एकतर त्या काळात पुजेची पध्दत वेगळी असावी किंवा जी मंदीर बांधली जात असावीत ती बांबु, वीटा, भाजलेल्या वीटा, लाकुड यांचा उपयोग करुन बांधली जात असावीत. ओरिसातील उदयगिरी लेण्यातील दगडांच्या बांधकामाप्रमाणे साहित्य वापरुन मंदीर उभारले जात असावे.
अर्थात इष्ट देवतांच्या पुजेसाठी प्राचीन काळी यज्ञवेदी वापरुन पुजा किंवा यज्ञाच्या माध्यमातून त्या देवतेला प्रसन्न करुन घेतले जायचे. सहाजिकच या यज्ञवेदींच्या आकाराचा प्रभाव सुरवातीच्या मंदीर स्थापत्यावर पडला. मात्र हे यज्ञ शक्यतो गावाबाहेर एकांत असलेल्या जागेवर केले जात असल्यामुळे त्यांचा वापर संपल्यावर विस्मरणात गेले.
अर्थात सुरवातीच्या काळातील मंदीराची बांधणी साधी होती.काळानुरुप त्यात एकेक घटकांची भर पडत गेली आणि आज आपण जी मध्ययुगीन मंदिर बघतो आहोत, त्या स्वरुपात उभारली जाउ लागली.
इ.स. पाचव्या ते सातव्या शतकात जी मंदीर उभारणी आणि त्याच्या स्थापत्यात झालेले स्थित्यंतर याचा आढावा घेउया.
सांची येथील प्राचीन मंदीर :-
मध्य प्रदेशातील सांची हे नाव घेतले कि बहुतेकांच्या नजरेसमोर सांची येथील प्रसिध्द बौध्द स्तुप येतो. अर्थात याच स्तुपाच्या आवारातच आहे भारतातील सर्वात प्राचीन मंदिर, सांची १७. हे मंदीर स्तुपाच्या तुलनेत प्रसिध्दीच्या झोतात नसले तरी भारतीय स्थापत्य इतिहासातील एक महत्वाचा टप्पा आहे. जरी वास्तुशास्त्राच्या विचार केला तर हे मंदीर साधे दिसत असले तरी हे मंदीर म्हणजे मंदीराच्या स्थापत्यशैलीचे बीज आहे हे विसरुन चालणार नाही. या मंदीराचा उभारणीचा कालावधी इ.स. चौथ्या शतकाचा उत्तरार्ध ते पाचव्या शतकाचा पुर्वार्ध म्हणजे गुप्तकालीन असावा असे मानले जाते. अर्थात बर्याच तज्ज्ञांच्या मतानुसार हे मंदीर बुध्द धर्मियांचे प्रार्थनास्थळ असावे असे आहे.मात्र बुध्द धर्मात मंदीर उभारणी लोकप्रिय झाली नाही. सहाजिकच याच मंदीराच्या बांधणीपासून प्रेरणा घेउन हिंदु धर्मीयांनी मंदिर उभारणी करताना यातील बांधकाम वैशिष्ट्यांचा वापर करुन घेतला.

सांची येथील मंदीराचे स्थापत्य खुपच साधे आहे. याचे छत चौरसाकृती असून सपाट आहे.दर्शनी भागात चार स्तंभ आहेत. मंदीराच्या आत किंवा बाह्यांगावर फारसे कोरीवकाम नाही. परंतु खांबावर मात्र नक्षीकाम दिसते. खांबावर उलटी कमळ कोरलेली दिसतात तर छताला आधार देणार्या शीर्षभागी सिंह कोरलेले दिसतात. सांची १७ मंदीराशेजारीच सांची १८ या जागेवर अवशेष दिसतात. हे बहुधा दुसर्या शतकातील दगड आणि वीटांचे मंदीर असावे. पण त्याचे फारच थोडे अवशेष शिल्लक आहेत.
केवलनरसिंह मंदीर, रामटेक ,महाराष्ट्र
हे मंदीर म्हणजे वाकाटककालीन सर्वात प्राचीन अवशेष आहे.शिवाय दगडाची बांधणी असलेले महाराष्ट्रातील सर्वात प्राचीन मंदीर आहे. हे मंदीर पाचव्या शतकातील असून बहुधा सांची १७ मंदीराच्या आधीचे किंवा समकालीन असावे. छोटे चौरसाकृती गर्भगृह आणि चौरस आकाराचा सभामंडप व चौकोनी आकाराचे छोटेसे प्रवेशद्वार अशी याची रचना आहे. बाकी कोरीवकाम वाकाटक स्थापत्यशैलीचे आहे.


दशावतार मंदीर, देवगड, उत्तर प्रदेश :-
उत्तर प्रदेशातील ललितपुर जिल्ह्यातील देवगड येथील दशावतार मंदीर भारतातील प्राचीन मंदीरापैकी एक मानले जाते.हे मंदीर देखील गुप्तकालीन असून त्याची उभारणी देखील इ.स.४७५ ते ५०० दरम्यान झाली असावी. हे मंदीर भगवान विष्णु यांना समर्पित आहे आणि इथे विष्णुचे सर्व अवताराच्या मुर्ती कोरल्या आहेत. याच बरोबर इथे गंगा, यमुना, इंद्र, शिव आणि कार्तिकेय यांच्या मुर्ती बघायला मिळतात. इ.स. १८७५ मध्ये सुप्रसिद्ध पुरातत्व संशोधक सर अलेक्झांडर कनिंगहॅम यांनी या परिसराला भेट दिली.इथे त्यांना गुप्तकालीन बरेच शिलालेख सापडले.
भारतात अस्तित्वात असलेल्या पंचायतन मंदीरापैकी हे एक आहे. पंचायतन मंदीरात मुख्य मुर्ती भोवती चार लहान मुर्ती असतात. या मंदीराच्या बाह्य भागावर असलेल्या बहुतेक मुर्ती विसाव्या शतकात चोरीला गेल्या. ज्या थोड्या मुर्ती शिल्लक होत्या त्या दिल्लीच्या नॅशनल म्युझीयम आणि अहमदाबादच्या लालभाई दलपतभाई म्युझीयममध्ये ठेवल्या आहेत.

भितरगाव मंदीर, उत्तर प्रदेश :-
भारतातील पुरातन मंदीरापैकी वीटांनी बांधलेले हे एक प्राचीन मंदीर. उत्तर प्रदेशातील कानपुर जिल्ह्यातील भितरगाव येथे हे मंदीर अद्याप उभे आहे. हे सुध्दा गुप्तकालीन मंदीर असून इ.स. पाचव्या शतकातील आहे. या मंदीराचे प्रमुख वैशिष्ट्य म्हणजे याला असलेले शिखर. ज्या आद्य मंदीरांची शिखर अजूनही बघायला मिळतात, त्यापैकी हे एक. तसेच इथे कमानीचे स्थापत्य बघायला मिळते.मंदीराच्या बाह्यांगावर शिव्,विष्णु, गंगा, दुर्गा आणि हिंदु धर्मातील इतर देवतांच्या मुर्ती दिसतात. या मंदीराची कलौघात बरीच पडझड झाली. शिवाय अठराव्या शतकात इथे वीज कोसळली, त्याने मंदीराचे आणखी नुकसान झाले.हे कमी म्हणून कि काय इ.स. १८९४ मध्ये स्थानिक लोकांनी मंदीराच्या डागडुजीचा प्रयत्न केला, ज्यामुळे मंदीराचे आणखी नुकसानच झाले. त्यामुळे १९०९ मध्ये येथील बरेच अवशेष लखनौच्या राज्य वस्तुसंग्रहालयात हलविण्यात आले. १९६० मध्ये पुरातत्व खात्याच्या व इतिहास संशोधकांनी या मंदीर स्थापत्याचा अभ्यास सुरु केला. सध्या हे मंदिर पुरातत्व खात्याने संरक्षित केले आहे.
कपोतेश्वर मंदीर , आंध्र प्रदेश
आंध्र प्रदेशातील गुंटूर जिल्ह्यात गुंटूर शहरापासून ७५ कि.मी. वर चेजेर्ला गावात इ.स.पाचव्या शतकातील मंदीर आहे.याची रचना महाराष्ट्रातील तेर गावातील त्रिविक्रम मंदीराशी मिळतीजुळती आहे. या दोन्ही मंदीराची बांधणी सारखीच म्हणजे चैत्यगृहासारखी आहे. मंदीराची मागील बाजु घोड्याच्या नालेच्या आकाराची म्हणजे चापाकार आहे. या दोन्ही मंदीरांची उभारणी वीटांचा वापर करुन केली आहे. चेजेर्ला मंदीराची उभारणी आंध्र प्रदेशाच्या किनारपट्टीच्या भागात राज्य करणार्या आनंद राजाने केली असावी. तर त्रिविक्रम मंदीराची उभारणी वाकाटक काळात झाली असावी. मात्र तज्ज्ञांच्या मतानुसार दोन्ही मंदीरे मुळची बौध्द प्रार्थनास्थळे असावीत, ज्यांचे कालांतराने हिंदु मंदीरात रुपांतर झाले असावे. तेरच्या वास्तुचे रुपांतर त्रिविक्रम या विष्णु मंदीरात तर चेजेर्ला मंदीराचे रुपांतर कपोतेश्वर या शिवमंदीरात झाले.

भुमरा येथील शिवमंदीर :-
खजुराहोपासून ११७ कि.मी. आणि सतना रेल्वे स्टेशनपासून ६ कि.मी.वर असलेल्या भुमरा या गावी हे मंदीर आहे. लाल दगडात बांधलेले हे मंदीर पाचव्या ते सहाव्या शतकातील असून हे देखील गुप्तकालीन आहे. या मंदीरावर कलाकुसर केलेली असून द्वारशाखेवर गंगा आणि यमुना यांच्या मुर्ती दिसतात. गाभार्यात गुप्तकाळातील एक मह्त्वाचे शिल्प म्हणजे एकमुखी शिवलिंग आहे. मध्य प्रदेशातील उदयगिरी गुंफाप्रमाणेच या मंदीरात देखील भारतातील प्राचीन गणेश मुर्ती आहे. दुर्दैवाने हे मंदीर दुरावस्थेत असून इथली बरीच शिल्प जगभरातील वस्तुसंग्रहालयात आहेत. मंदीराचे सध्या फक्त गर्भगृहच काय ते शिल्लक आहे. सभामंडपाचे फक्त अवशेष दिसतात.
गोप मंदिर, गुजरात :-
गुजरात मधील जामनगर जिल्ह्यात जामनगर शहरापासून ६० कि.मी. अंतरावर गोप मंदिर आहे. हे मंदीर सहाव्या किंवा सातव्या शतकातील असून नेमकी याची उभारणी कोणी केली हे निश्चित समजलेले नाही. बहुधा या भागात राज्य करणार्या मैत्रक राजवंशाने याची बांधणी केली असावी असे मानले जाते. गुजरातमधील हे सर्वात प्राचीन मंदीर. याला सध्या गोपनाथ मंदीर म्हणतात.हे मंदीर सुर्याचे असावे असे काही तज्ज्ञ मानतात, तर काहींच्या मते हे शिवमंदीर असावे.
दाह पर्बिता मंदीर, आसाम :-
भारतात असणारी बहुतेक प्राचीन मंदीर एकतर मध्य भारतात विशेषत: गंगेच्या खोर्यात उभारलेली दिसतात, तर काही मंदीर पश्चिम आणि दक्षिण भारतात दिसतात, मात्र आसाममधील ब्रम्हपुत्रा नदीच्या तीरावर असलेल्या तेजपुर जिल्ह्यात तेजपुर रेल्वे स्टेशनपासून ४.२ कि.मी. अंतरावर असलेले दाह पर्बिता मंदीर हे एक पुर्व भारतातील प्राचीन मंदीर आहे. सध्या या मंदीराच्या गर्भगृहाची द्वारशाखा आणि उंबरा हेच काय ते अस्तित्वात आहे. तज्ज्ञांच्या मते हे मंदीर अहोम राजवटीच्या आधीच्या काळातील असावे. याचा काळ बहुधा पाचवे ते सहावे शतक असा आहे.
लक्ष्मण मंदीर, सिरपुर:-
छत्तीसगडची राजधानी रायपुरपासून ८० कि.मी.वर सिरपुर जिल्ह्यात हे मंदीर आहे. या मंदीराचे शिखर वीटांनी बांधलेले असून इथे सापडलेल्या शिलालेखानुसार हे मंदीर दक्षिण कोसल देशावर राज्य करणार्या पांडुवंशातील राजा शिवगुप्त बालार्जुन याची आई राणी वसताने या मंदीराची उभारणी केली. अर्थात या मंदीराच्या गर्भगृहात सध्या कोणतीही मुर्ती नाही. मात्र द्वारशाखेच्या पट्टीवर असलेल्या विष्णुच्या आणि दशावताराच्या मुर्तीवरुन हे मंदीर विष्णु मंदिर असावे.
मुंडेश्वरी मंदीर, बिहार :-
जरी हे मंदीर बिहारमध्ये असले तरी वाराणसीवरुन इथे जाणे सोयीचे आहे. वाराणसीपासून १०२ कि.मी.वर कैमुर जिल्ह्यात हे बिहार राज्यातील सर्वात प्राचीन मंदीर आहे. इथे असलेल्या शिलालेखानुसार या मंदीराची उभारणी इ.स. ६३५ मध्ये करण्यात आली. या मंदीराचा आकार अष्टकोनी असून त्याचे बांधकाम पाषाणाचा वापर करुन करण्यात आले. कालौघात मंदीराचे शिखर नष्ट झाले आहे. मंदीराच्या बाह्य भिंतीवर शिल्पकाम दिसते. मंदीराच्या द्वारशाखेवर गंगा, यमुना आणि द्वारपाल दिसतात. तर गाभार्यात चर्तुमुखी शिवलिंग आहे.
दुर्गा मंदीर, एहोळ, कर्नाटक :-
कर्नाटकातील बेळगाव विमानतळापासून १९० कि.मी. तर बदामी रेल्वे स्टेशनपासून २५ कि.मी.वर एहोळमधील दुर्गा मंदीर हे एक वैशिष्ट्यपुर्ण मंदीर असून त्याचा लंबवर्तुळाकार विशेष आहे. हे मंदीर चालुक्यकालीन असून याची उभारणी सहाव्या शतकाच्या मध्यावर ते सातव्या शतकाच्या मध्यापर्यंत झाली असावी. या मंदीराची रचना चेजेर्ला आणि तेरच्या मंदीरासारखीच आहे.मात्र या दोन मंदीराला असलेल्या घुमटाकार छतासारखे छत इथे नाही. हे मंदीर एका अधिष्ठाणावर उभारले असून भोवताली खुला प्रदक्षिणापथ आहे. अर्थात या मंदीराच्या वास्तुरचनेत नंतर बरेच बद्ल करण्यात आले. अगदी शिखरही नंतर बांधण्यात आले असावे.
मंदिरांचे अंतरंग आणि बाह्यांग यांची थोडीफार माहिती घेतल्यानंतर महाराष्ट्रातल्या अश्या मंदिरांची यादी बनवूया जी पहिलीच पाहिजेत, हि मंदिरे आपल्या सुंदरतेने, वास्तुशास्त्राने, शिल्पकलेने आपले एक विशिष्ट स्थान कमावून बसलेली आहेत.
१. अंबरनाथचे महादेव मंदिर
२. कोप्पेश्वर मंदिर, खिद्रापूर
३. महालक्ष्मी मंदिर, कोल्हापूर
४. अन्वा शिवमंदिर, सिल्लोड, औरंगाबाद
५. निळकंठेश्वर मंदिर, निलंगा, लातूर
६. श्रीविठ्ठल मंदिर, पानगाव, लातूर
७. धर्मपुरीचे केदारनाथ मंदिर, पानगाव पासून ३० कि.मी., लातूर
८. ताकाहारी मंदिर, नगर
९. औंढानागनाथ मंदिर, हिंगोली
१०. सिद्धेश्वर मंदिर, होट्टल, नांदेड
११. मार्कंडेश्वर मंदिर, मार्कंडी, गडचिरोली
१२. दैत्यसुदन मंदिर, लोणार
१३. गोंदेश्वर पंचायतन मंदिर, सिन्नर, नाशिक











.jpg)

.jpg)
.jpg)

.jpg)























































































"हेमाडपंती म्हणजे काय" ह्या प्रश्नाचे उत्तर निश्चितपणे द्यावे असे मला काही माहीत नाही. 'A survey of Hemadpanti temples in Maharashtra' by Omkar Prasad Verma, 1973, Nagpur University असे एक छोटेखानी पुस्तक मला जालावर दिसले पण ते केवळ नावाच्या स्वरूपात. त्या पुस्तकात काही निश्चित माहिती असेल असे त्याच्या नावावरून वाटते.
पु.ग.सहस्रबुद्धेलिखित 'महाराष्ट्र संस्कृति' ह्या पुस्तकाच्या पृ. २३८ वर पुढील त्रोटक माहिती आहे. 'रामदेवराव यादवाचा प्रधान हेमाडपंत ह्याने एका विशिष्ट पद्धतीने महाराष्ट्रात अनेक देवळे बांधली म्हणून ह्या पद्धतीस 'हेमाडपंती 'असे नाव पडले. हेमाडपंती पद्धतीच्या मंदिरांची रचना चुना किंवा माती न घेता फक्त एकावर एक दगड ठेऊन केली जाते. देवालयाच्या पायाची आखणी ज्या आकाराची असेल त्याच आकाराची पण लहान अशी शिखराची बैठक असते. प्रमुख दिशांना कोन येतील असा चौकोन कल्पून एका कोनासमोर प्रवेशद्वाराची व्यवस्था केलेल्या ह्या इमारतीच्या पायाची आखणी कोनबद्ध असते. ह्या पायावर उभारलेल्या भिंतींनी जे कोन बनतात त्या सर्व कोनांच्या रेषा जमिनीपासून कळसापर्यंत गेलेल्या असतात.' पुढे अंबरनाथ येथील शिवमंदिर, सिन्नर येथील मंदिर अशी काही उदाहरणेहि उल्लेखिलेली आहेत.
'महाराष्ट्र संस्कृति -घडण आणि विकास' ह्या प्रा. ह.श्री. शेणोलीकर/प्र.न.देशपांडेलिखित पुस्तकात प.१०९ वर असा उल्लेख आढळतो की ही मध्यभारतीय शैली हेमाडपंताने महाराष्ट्रात प्रचलित केली. महेश्वर/मेहेकर/सिन्नर/अंबरनाथ/औंढे नागनाथ अशा मंदिरांचा ह्या शैलीची मंदिरे म्हणून उल्लेख करण्यात आला आहे.
शाळेत ऐकल्याप्रमाणे आणि तसेच जालावर मिळालेल्या काही त्रोटक उल्लेखांवरून असे वाटते की अशा मंदिरांची वैशिष्टये पुढीलप्रमाणे मानता येतील. ही मंदिरे काळ्या पाषाणाचे मोठे चिरे एकमेकांवर वजनाच्या दडपणाने बसविलेले असतात. त्यांच्या जोडणुकीत चुना वा तत्सम बंधकाचा उपयोग नसतो. (बांधकामाच्या टिकाऊपणाला केवळ वजन पुरेसे पडेल काय?) बांधकामात लाकडाचा उपयोग जवळजवळ नसतो आणि दारे खिडक्याहि अगदी कमीतकमी असतात. मंदिरावर विटा वापरून बांधलेला आणि निमुळता होत गेलेला कंगोरेदार कळस असतो. त्याच्या आधारासाठी त्याच्या खाली एकमेकांशी ४५ अंश कोन करून बसविलेले आणि लहान होत जाणारे लांब चिर्यांचे चौरस असतात.
ह्या शैलीस 'हेमाडपंती' हे नाव केवळ महाराष्ट्रातच प्रचलित आहे असे दिसते. 'History of Indian and Eastern Architecture' ह्या सर जेम्स फर्ग्युसनलिखित पुस्तकात हेमाडपंताचा उल्लेखहि नाही आणि त्याच्या नावाच्या काही शैलीचाहि नाही. 'Encyclopaedia of Indian temple architecture' ह्या १९९१ साली प्रकाशित झालेल्या मायकेल माइस्टर/मधुसूदन ढाकीलिखित पुस्तकातहि अशा शैलीचा काही उल्लेख मिळत नाही.
हेमाडपंताच्या पूर्वी होऊन गेलेल्या शिलाहार राजांनी ठिकठिकाणी बांधलेली मंदिरेहि 'हेमाडपंती' आहेत असे म्हणण्याचा प्रघात आहे. ह्या सर्व गोष्टींचा आणि माहितीच्या अभावाचा विचार करता असे वाटते की अन्यत्र आधीच वापरात असलेली एक शैली हेमाडपंताच्या मार्गदर्शनाखाली महाराष्ट्रात पसरली आणि कोठेतरी (केव्हा आणि कोणामुळे हे माहीत नाही) तिला हेमाडपंताचे नाव चिकटले. महाराष्ट्रापुरते ते नाव रूढ झाले आणि एका पिढीकडून पुढच्या पिढीकडे असे संक्रमित होत गेले. महाराष्ट्रात तिला 'हेमाडपंती' म्हणता ही बाब महाराष्ट्राबाहेर कधीच प्रसारित झाली नाही. 'हेमाडपंती शैली' हा एक मराठी सांस्कृतिक प्रघात निर्माण झाला.
आमच्या कोल्हापूरचे महालक्ष्मी मंदिर ही हेमाडपंती आहे.
प्रसिद्ध हेमाडपंती स्थापत्यशैली वास्तुशिल्प पद्धतीने या देवळाची बांधणी केलेली आहे, दरजा न भरता एकमेकांवर ठेवलेल्या अशा मोठमोठया चौकोनी किंवा आयताकॄती दगडात (अडक पद्धतीने) करण्यात आलेली आहे. देऊळ पश्चिचमाभिमुख आहे, मात्र हे महालक्ष्मीचे मंदिर कोणी बांधले हे निश्चिततपणे सांगता येत नाही.
देवळात एकूण चार शिलालेख दिसतात. हे शिलालेख देवनागरी तत्सम भाषेत आहेत असे जाणकार म्हणतात. त्यापैकी पहिला मुख्य देवळाच्या पाठीमागे असलेल्या शेषशायी मंदिराच्या डाव्या बाजूला आहे. हा शिलालेख आपल्याला पूर्वेकडे असलेल्या दरवाजामधून प्रवेश करताना लागतो. दुसरा शिलालेख मंदिराच्या परिसरातच असणाऱ्या दत्त मंदिराच्या पाठीमागे असलेल्या हरिहरेश्वगराच्या देवळाच्या भिंतीवर असून त्यावर शके ११४० मध्ये कोरलेला आहे असा उल्लेख सापडातो. तिसरा शिलालेख देवळाच्या पटांगणात प्रवेश करताना डाव्या बाजूला असलेल्या एका खांबावर असून तो शके ११५८ चा आहे. आणि चौथा शिलालेख मंदिराच्या डाव्या बाजूला (घाटी दरवाजाच्या शेजारी) असलेल्या नवग्रहांच्या छोटया देवळातील एका खांबावर आहे.
माझ्याकडे महालक्ष्मी मंदिर माहितीचे छोटे पुस्तक आहे त्यानुसार व विकिपीडियातील माहितीनुसार सध्याच्या मंदिराचा मुख्य भाग इ. स. 600 ते 700 या शतकातले असल्याचे दाखले मिळतात, परंतु प्रत्यक्ष उपलब्ध पुरावे पुढीलप्रमाणे – राष्ट्रकुल राजा पहिला अमोघवर्मा याचा इ. स. 793 मधला ठाणे जिल्ह्यात संजान गावी मिळालेला ताम्रपट या ताम्रपटात राष्ट्रकूट नॄपती प्रथम अमोघवर्ष याने काही सार्वजनिक आपत्तीच्या निवार्णार्थ आपल्या डाव्या हाताची अंगुली महालक्ष्मीला अर्पण केल्याचा उल्लेख आला आहे. सन 980 मध्ये शिलाहाराने दिलेला ताम्रशासन (म्हणजे काय? याचा फक्त उल्लेखच जागोजागी आढळतो) हे दोन प्राचीन पुरावे.
आठव्या शतकात भूकंपामुळे हे मंदिर खचल्यामुळे नवव्या शतकाच्या कालावधीत राजा गंडवादिक्ष याने मंदिराचा जीर्णोद्धार व विस्तार केला. त्याने नवीन महाकालीचे मंदिर बांधले तर सन 1178 ते 1209 या काळात शिलाहार राजा जयसिंग व राजा सिंघल यांच्या कारकीर्दीत दक्षिण दरवाजा व अतिबलेश्वार मंदिर बांधले. सन 1218 मध्ये यादव तौलम याने पश्चिम द्वार (महाद्वार) बांधले. याच राजाने देवीला जडजवाहीर अर्पण करून द्रव्य दिल्याचा उल्लेख मंदिरातील गारेचा गणपती श्री सिद्धिविनायक मंदिरातील खांबावर आढळतो.
मंदिराचे वैशिष्ठ्य म्हणजे कार्तिक आणि माघ महिन्यात ठराविक तीन दिवशी संध्याकाळी सूर्यकिरणे महाद्वारातून (पश्चिम दरवाजा) प्रवेश करून गाभाऱ्यापर्यंत पोहचतात आणि तेथून ती महालक्ष्मीच्या मूर्तीवर पडतात. ही किरणे पहिल्या दिवशी प्रथम महालक्ष्मीच्या पायावर पोहचतात, दुसऱ्या दिवशी देवीच्या कमरेपर्यंत पोहोचतात आणि तिसऱ्या दिवशी तेथून हळूहळू तिच्या मस्तकापर्यंत जातात. हा वास्तुशास्त्रातला वैशिष्टपूर्ण खेळ तीन दिवस फक्त पाच मिनिटेच चालतो. याला किरणोत्सव असे म्हणतात.
देवळाच्या मुख्य वास्तूचे दोन मजले आहेत आणि त्याची बांधणी कोल्हापूरातच मिळणाऱ्या काळया दगडात केली आहे. कोल्हापुरातील प्रसिद्ध रंकाळा तलावाचा शाहू महाराजांनी विकास करण्याआधी तिथे असणारी खण म्हणजे महालक्ष्मीच्या देवळासाठी लागणारा दगड काढलेली खाण असे मानले जाते. महालक्ष्मीच्या मूर्तीच्या बरोबर वर दुसऱ्या मजल्यावर शिवलिंग आहे आणि ते मातुलिंग म्हणून ओळखले जाते. महालक्ष्मीच्या गाभाऱ्यात उभारले असता दुसरा वर मजला असेल असे वाटत नाही.
याखेरीज महालक्ष्मी मंदिर संदर्भात बाकी विशेष काही स्थापत्यसंबंधीचीची मला माहिती मिळत नाही / मिळाली नाही.
मंदिरातील शिलालेखांविषयी काही सांगता येईल का?
तसेच,
सन 980 मध्ये शिलाहाराने दिलेला ताम्रशासन (म्हणजे काय? याचा फक्त उल्लेखच जागोजागी आढळतो)
हे म्हणजे काय? ते नेमके कळले नाही. काही अधिक प्रकाश पाडता येईल का?
सन 980 मध्ये शिलाहाराने दिलेला ताम्रशासन
ताम्रशासन म्हणजे ताम्रपट.
शिलालेख एकाकडून दुसरीकडे घेऊन जाणे अवघड झाल्यामुळे ताम्रपटांचा वापर सुरु झाला. वाकाटक, राष्ट्रकूट, यादव, शिलाहार यांचे शिलालेख आणि ताम्रपट दोन्ही आढळतात.
सर्वसाधारणपणे ताम्रपटाचे एकूण तीन पत्रे असतात. पहिल्या पत्र्याची दर्शनी बाजू कोरीव असे व त्यावर लेख नसे. त्याच्या आतील बाजूस लेखाची सुरुवात होई. मधल्या पत्र्याच्या दोन्ही बाजूवर लेख कोरला जाई व तिसर्या पत्र्याच्या आतील बाजूवरही लेख कोरला जात असे. तिसर्या पत्र्याची बाहेरील बाजूही कोरीच असे. तिन्ही पत्र्याच्या कडा उंचावलेल्या व मधली बाजू खोलगट त्यामुळे पत्रे एकमेकांवर ठेवल्यावर पेटीसारखे दिसत व आतील मजकूर घासला न गेल्यामुळे सुरक्षित राही. तिन्ही पत्र्यांच्या कडेला भोक पाडून त्यातून धातूची तार ओवली जाई व तारेची दोन्ही टोके एकत्र करून त्यावर राजमुद्रा ठोकली जाई. राजेलोक दानधर्म करत हे दान ताम्रपटावर नोंदवून दात्याला दिले जाई व तो एक कायदेशीर दस्तावेज असे.
दिवेआगरचा ताम्रपट महाराष्ट्रातला सर्वात प्राचीन समजला जातो.
Temples
in India are usually elaborate structures, be it scale, ornamentation
or both. Think Meenakshi Temple in Madurai, the magnificent temples of
Khajuraho, or the ornate Dilwara Temple of Rajasthan. So it may be a bit
of a surprise that the oldest surviving temple in the country is a
small, nondescript shrine in Sanchi, Madhya Pradesh.
– The tradition of temple building in India can be traced to the Gupta period (3rd to 6th century CE).
This
does not mean that temples were not built before this time. Remnants of
a Mauryan-era, brick-and-stone structure believed to be a temple have
been excavated in Bairat district in Rajasthan and dated to the 3rd
century BCE, and a similar oval, brick temple plan has been excavated at
Besnagar, Vidisha, Madhya Pradesh dated to the 2nd century BCE. Also,
as living shrines, many temples of great antiquity have undergone
frequent renovation, making it very difficult to trace their origins and
history.
That’s why ‘Sanchi 17’, a Gupta-period shrine, is so
significant. Dated to the 5th century CE, it is the oldest surviving
complete temple found in India to date. Sure, there are early apsidal
(round-ended) shrines like those from the Kushana period (30 CE to 375
CE) excavated at Sonkh near Mathura by Dr Herbert Hartel, but once again
they exist only on plan and not on elevation.
We don’t find
intact temples predating the Gupta period probably because the modes of
worship were different then or temples were built either from perishable
materials like bamboo, wood, mud brick or even burnt brick, or were cut
out of rock as we see in Udayagiri in Odisha or Barabar in Bihar.
Besides
temple worship, yagyas were performed on fire altars, and one can see
the influence of these altars on the design and layout of the early
temples. Since tradition dictated that these sacrificial altars be built
on the outskirts of a settlement and abandoned on completion of the
ceremony, they have been lost over time.
Still, we have a lot to
go on. Considering the heights temple architecture later achieved, it is
difficult to imagine the simplicity of the earliest shrines but couched
in that apparent simplicity are the basic elements that define the
elaborate temples of the later, medieval period.
Let us explore
some of the earliest temples in the country and see how temple
architecture evolved from the 5th to the 7th centuries CE.
Sanchi Temple 17: The oldest surviving temple in India
The
town of Sanchi in Madhya Pradesh is known for the Sanchi Stupa, an icon
of ancient Indian architecture and religion. Sanchi also houses another
significant milestone in the development of Indian architecture and
religion, albeit a lot less glamorous. Located within the Stupa complex
is one of the oldest surviving stone temples in India. ‘Sanchi 17’ may
look basic but it holds the seeds of temple architecture in India.
– Sanchi 17 is dated to around 400 CE or the late 4th or early 5th century CE, during the reign of Gupta dynasty.
Most
scholars agree that the temple was used for Buddhist worship. While
temple-building in Buddhism didn’t gain popularity, many of the elements
of this temple would go on to be incorporated into Hindu temple
architecture.
The structure of Sanchi 17 is extremely simple. It
has a square, flat-roofed sanctum with a porch that as four pillars in
the front. The interior and exterior of the temple are undecorated but
the pillars are carved. They are carved with inverted lotuses while the
capital, which supports the roof, is carved with lions. Near Sanchi 17
is Sanchi 18, which might have been a stone-and-brick temple from the
2nd century CE but little of its original structure survives.
How to get there: Sanchi is approximately 50 kms from Bhopal
Kevalanarasimha Temple, Ramtek, Maharashtra
The
Kevalanarasimha Temple is the oldest extant Vakataka temple and the
oldest stone temple in Maharashtra. The temple, dated to the 5th century
CE, is a little younger or contemporary with Sanchi 17.
The
temple has a square garbagriha with a slightly smaller square mandapa in
front. It has a square doorway with rectangular door jambs carved with
typical Vakataka-style ganas.
How to get there: Ramtek is about 50 km from Nagpur in Maharashtra
The
Dashavatara Temple is in Deogarh, in Lalitpur district of Uttar
Pradesh. This temple is also a Gupta-period shrine and dated to the late
5th century CE, between 475 and 500 CE. The temple is dedicated to
Vishnu and it is believed that his various avatars were once depicted
here.
The temple has exquisite relief sculptures and the doorway
is elaborately adorned. One can see sculptures of Vishnu in his various
forms here along with representations of deities like Ganga, Yamuna,
Indra, Shiva and Kartikeya.
– Noted archaeologist Sir Alexander Cunningham visited the site in 1875 and found several Gupta-era inscriptions here.
The
temple at Deogarh is the oldest-known Panchayatana-style temple in
India, where a main shrine is surrounded by four smaller shrines. Sadly,
it is believed that most of the reliefs on the walls were stolen during
the first few decades of the 20th century. A few others were taken to
major museums such as the National Museum in Delhi and Lalbhai
Dalpatbhai Museum in Ahmedabad.
How to get there: Deogarh is 30 km from Lalitpur in Uttar Pradesh
Bhitargaon Temple, Uttar Pradesh: Oldest surviving brick temple
This
temple in Bhitargaon in Kanpur district in Uttar Pradesh is one of the
largest ancient brick temples to have survived. Like the one at Deogarh,
this one too is a Gupta-era shrine dating back to the 5th century CE.
It also has one of the earliest shikharas seen in Indian
temples. The temple at Bhitargaon is also significant because it
possibly has one of the earliest known ‘true arches’ in the country.
The
temple has depictions of Shiva, Vishnu, Ganesha, Durga and scenes from
Hindu mythology on its walls. The temple has been heavily damaged over
the centuries, most notably by a lightning strike in the mid-1800s. In
1894, the local administration ‘repaired’ the temple, which caused a bit
of damage to the original structure. In 1909, many objects were sent
from here to the Lucknow State Museum. Facing official apathy for
decades, it was only in the 1960s that historians began taking an
interest in the temple. Today, it is an ASI protected monument.
How to get there: Bhitargaon Temple is a 32-km drive from Kanpur city

Kapoteswara Temple, Chejerla, Andhra Pradesh; and Trivikrama Temple, Ter, Maharashtra
The
Kapoteswara Temple at Chejerla in Guntur district of Andhra Pradesh,
and the Trivikrama Temple at Ter in Osmanabad district of Maharashtra
are very similar in architecture and relatively small. Both have been
dated to approximatel 5th century CE. They are some of the earliest
examples of barrel-vaulted, apsidal temples (with a semi-spherical end)
in India. They are essentially built like rock-cut chaitya halls but freestanding and in brick.
According
to some historians, the Chejerla Temple was built by the Ananda kings
of coastal Andhra, while the Trivikrama Temple was built during the
Vakataka period (3rd to 5th century CE), making it the oldest standing
structure in Maharashtra.
Many scholars believe that these shrines may have been Buddhist chaityas
or prayer halls that were later converted for worship by Hindus. Today,
the temple in Ter is used to worship Trivikrama, a form of Vishnu,
while the temple in Chejerla is used to worship Shiva as Kapoteswara.
The image inside the Ter temple is in the Vakataka style, which points
towards it being a Hindu shrine from its inception.
How to get there: Kapoteswara
Temple at Chejerla is around 75 km from Guntur in Andhra Pradesh.
Trivikrama Temple is around 20 km from Osmanabad in Maharashtra
Shiva Temple, Bhumara, Madhya Pradesh
The
Shiva Temple in Bhumara in Satna district of Madhya Pradesh is dated to
the 5th-6th centuries CE and is ascribed to the Gupta period. This
temple, built from red sandstone, has some exquisite sculptures like the
depictions of Ganga and Yamuna on the door jambs. The Ekmukh Shivling
inside is one of the most significant sculptures of the Gupta period.
–
The temple also contains one of the oldest surviving images of Ganesha
in India, along with the one at the Udayagiri caves in Vidisha, Madhya
Pradesh.
Although the temple is badly damaged and many of
its sculptures have been taken to museums across the world, the sanctum
has survived and one can see the remnants of a mandapa.
How to get there: Bhumara is 117 km from Khajuraho airport and 6 km from Satna railway station in Madhya Pradesh
Gop Temple, Gujarat
The
Gop Temple is located in Jamnagar district of Gujarat. Dated to the
6th-7th century CE as there is a lack of clarity about its exact dates,
the temple is believed to have been built during the Maitraka Dynasty.
It is the oldest surviving temple in Gujarat.
Colloquially called
the Gopnath Mahadev Temple, it is believed to have originally been a Sun
temple even though some believe that it may have always been a Shiva
temple.
How to get there: Gop Temple is 60 km from Jamnagar city
Dah Parbatia Temple, Assam
While
most early temples are found in Central India and the Gangetic plains,
with a few to the west and south, an interesting find are the remains of
a temple at Dah Parbatia, a village on the banks of the Brahmaputra in
Tezpur district in Assam. Only the base of the garba briha,
door jambs and lintel of the temple survive. It is considered a pre-Ahom
period temple by art historians and scholars, and is believed to date
to the late 5th or 6th centuries CE.
How to get there: Dah Parbatia temple is 4.2 km from Tezpur Railway station in Assam
Lakshmana Temple, Sirpur, Chhattisgarh
The
Lakshmana Temple is a brick temple dated to the 7th century CE and is
located in Sirpur district of Chhattisgarh. The temple is surmounted by a
brick shikhara. According to an inscription found in the
temple, it was constructed by Queen Vasata, the mother of King
Shivagupta Balarjuna of the Panduvamshis of South Kosala. Although the
image of the deity from the sanctum sanctorum has been lost, the
depiction of Vishnu on the lintel and his various avatars on different
panels of the temple suggest that it must have been a Vaishnav temple.
How to get there: Lakshmana Temple is 80 km from Raipur city

Uttareshwara Temple, Ter, Maharashtra
The
Uttareshwara Temple is the oldest surviving brick temple in
Maharashtra, dated to the immediate post-Vakataka period of the 6th-7th
centuries CE. The temple consists of a garbha griha surmounted by a shikara with a small square mandapa
in the front. The temple is particularly noteworthy because of its
moulded brickwork as well as the carved wooden door frame of the
sanctum, which is the oldest surviving wooden architectural feature in
India.
How to get there: Uttareshwara is approximately 20 km from Osmanabad in Maharashtra
Mundeshwari Temple, Bihar
The
Mundeshwari Temple in Kaimur district of Bihar is regarded as the
oldest temple in Bihar. According to an inscription here, it is dated to
the year 635 CE. The temple is made of stone and has an octagonal plan.
The original shikhara collapsed and was lost over the
centuries. The temple’s walls are elaborately carved with vases and
foliage. The door jambs have the image of Ganga, Yamuna and Dwarapalas
on them. Inside the temple, a Chaturmukhi Shivling is worshipped.
How to get there: Mundeshwari Temple is 102 km from Varanasi city in Uttar Pradesh
Durga Temple, Aihole, Karnataka
The
Durga Temple in Aihole, Karnataka, is an excellent example of an
apsidal temple and has been dated from the mid-6th to the mid-7th
century CE. It is ascribed to the Chalukyan period. The temple is very
similar to the temples at Ter and Chejerla but lacks doesn't have a
barrel-vaulted roof. The temple was built on an elevated platform and
surrounded by an open corridor. The temple had many subsequent additions
made to it, including the addition of a shikhara.
How to get there: Durga Temple is 190 km from Belgaum Airport and 25 km from Badami railway station
These
are some of the earliest temples in India and ones which laid the
foundation of temple architecture. Subsequently, temple architecture in
India evolved into two distinct and elaborate styles – North Indian and
South Indian styles. Yet it is to these simple shrines from the ancient
era to which their origin can be traced.
*Cover Image: Dashavatara Temple in Deogarh, Uttar Pradesh
https://www.peepultree.world/livehistoryindia/story/monuments/indias-oldest-surviving-temples





























































































































































गेल्या शतकात मुर्तीपुजेच्या प्राचीनत्वाचा शोध घेण्यासाठी जे संशोधन झाले, त्यात भारतीय मंदीर स्थापत्याला कशी व कधी सुरवात झाली, याचाही शोध घेण्यात आला. भारतात सापडलेल्या प्राचीन मुर्ती बुध्दाच्या व कुषाणकालीन असून त्या अनुक्रमे गंधार व मथुरा शैलीत आहेत. त्यामुळे मुर्तीपुजा व मंदीरस्थापत्य या बाबी भारतीयांनी ग्रीकांकडून किंवा भारताच्या वायव्य परिसरात वस्ती करुन असलेल्या ग्रीकादभव संस्क्रुतीकडून आल्या असाव्यात असे गृहित धरण्यात आले आहे.कारण वैदिक संस्कृतीत देवांना आहुती द्यायची असेल तर यज्ञात आहुती दिली जाई. म्हणजे अग्नी त्या आहुती देवांपर्यंत पोहचवतो, अशी धारणा होती. त्यामुळे यज्ञविधी हाच पुजेचा एकमेव प्रकार होता. मुर्तीपुजेचे उल्लेख वेदामध्ये आढळत नाहीत. त्यामुळे देवाच्या मुर्ती बनवणे व मुर्तीसाठी वास्तु म्हणजेच मंदीर बांधणे हि संकल्पनाच वेदकाळात माहिती नव्हती. अर्थात याबाबत तज्ञांंध्ये मतांतरे आहेत. युरोपियन तज्ञांच्या मते जशी मुर्तीपुजा वैदीक धर्माला ज्ञात नव्हती, त्याचप्रमाणे त्यानंतर निर्माण झालेल्या जैन व बौध्द धर्मियांनाही हि संकल्पना नवीन होती. मात्र युरोपियन तज्ञांचे हे मत भारतीय विद्वांनानी विशेषत आनंद कुमारस्वामी यांनी पुरावे सादर करुन मुर्तीपुजा व मंदीर स्थापत्याची मुळे सुरवातीच्या काळात प्रचलित असलेल्या यक्षपुजेत असल्याचे दाखवून दिले.
याबबत सपुंर्ण अभ्यास करण्यासाठी धार्मिक वाहमय, उत्खननात आढळलेले पुरावे, कालएतिहासिक वस्तु आणि पुरावस्तु याचा सकल अभ्यास केल्याने असे लक्षात आले कि इसवी सनाच्या पहिल्या दोन शतकात वैदीक, जैन आणि बौध्द अश्या विवीध धर्मीयांना देवाच्या सगुण उपासनेची तीव्र गरज भासली
अर्थात मुर्तीपुजा सुरु झाली तरी मुर्तीचे स्वरुप कसे असावे, तीची वैशिष्ट्ये काय असावीत ? हे सर्व स्थानिक कलाकारांवर अवलंबून होते. ज्या भागात ग्रीक धर्माचा प्रभाव होता, त्या परिसरातील लोकांनी शिव, विष्णु किंवा बुध्दाची मुर्ती ग्रीक देवतेशी साम्य असलेल्या स्वरुपात साकारली. तर ज्या प्रेदेशात हा ग्रीकांचा प्रभाव नव्हता, त्यांनी या मुर्ती साकारताना आधीपासून प्रचलित असलेल्या यक्षमुर्तींशी साम्य असलेल्या असलेल्या स्वरुपात साकारल्या. सुरवातीच्या काळात बांधलेली मंदीर म्हणजे दगडी फरशी किंवा शिळाफलकावर देवाची मुर्ती आणि सभोवताली दगडी कठडा हे सर्व एखाद्या झाडाखाली असत. यामध्ये मुर्तीच्या खाली असलेल्या शिळेवर त्या देवतेचे वाहन कोरलेले असे. तसेच प्राचीन काळी पुजा केल्या जाणार्या देवतांना एखाद्या स्तंभावर कोरले जाई. या स्तंभाना ध्वज म्हणण्यात येई.या ध्वजावर म्हणजेच स्तंभावर जे लांछन कोरलेले असे त्यावरुन त्याच्या नावापुढे ध्वज हा शब्द लावून त्या राजाचे नाव घेतले जाई. उदा. गरुडध्वज, मकरध्वज. श्रीकृष्णाचा नातु प्रद्युम्न मकर हे लांछन वापरत असे म्हणून त्याचा उल्लेख भागवतात मकरध्वज म्हणून येतो. श्रीविष्णु गरुडध्वज तर बलराम तालध्वज म्हणून पुराणात विख्यात आहेत.
या पुजास्थानाचे वेगळेपण दिसावे व त्याचे संरक्षण व्हावे म्हणून त्याभोवती दगडी कठडा असे. राजस्थानातील घोसुंडी येथील स्तंभावर इ,स. पुर्व पहिल्या शतकातील शिलालेख आहे. त्यात नारायण नामक देवाच्या पुजास्थानाभोवती म्हणजे नारायण वाटीक भोवती उभारलेल्या दगडी कठड्याचा उल्लेख, गुड्डीमल्लम येथे सापडलेले कायालिंग, सांची, भारहुत येथे दगडात कोरलेली अश्या प्रकारची उदाहरणे म्हणजे मंदिर स्थापत्याची प्रारंभिक स्थिती आहे. या पुज्य वास्तु म्हणजे प्राथनिक काळातील मंदीर आणि त्याच्या परिसरात असणारी झाडे यांच्याभोवतॉ असलेल्या झांडाच्या भोवती दगडाचा वापर करुन प्रकार म्हणजे संरक्षक भिंत बांधलेली असे. याचा पुरातत्वीय पुरावा म्हणजे तात्कालीन नाण्यावर असे चित्र बघायला मिळते. अगदी त्याकाळच्या मंदीर म्हणजे झाडाखाली असलेल्या मुर्तीवर दगडाचे छत घातले जाइ. अर्थात झाडे वाढली कि ती छत तोडून बाहेर पडत. हे माहिती असून देखील असेच छत घातले जाई. याचा अर्थ त्याला काहीतरी धार्मिक मह्त्व असले पाहिजे.
पुढे मंदीराच्या स्थापत्याचा विकासाचा पुढचा टप्पा गाठला गेला. सुरवातीला मंदीराचे स्वरुप जे एखाद्या पर्णकुटीसारखे होते, ते त्यात बदल होउन पुजेचे धार्मिक विधी करण्यासाठी तसेच पुजाविधी करण्यासाठी एकत्र जमणार्या लोकांसाठी पुरेशी जागा उपलब्ध करुन देण्यात आली. याचा पुढचा विकासाचा टप्पा म्हणजे सुरवातीला जे गर्भगृह आणि मंडप असे मंदीराचे स्वरुप होते, त्यात प्रदक्षिणापथाची भर पडली. साध्या पर्णकुटीचे रुपांतर चापाकार मंदीरात झाले. या स्थापत्य शैलीचा प्रभाव पडून बौध्द लेण्यात अशीच रचना करण्यात आली, जी आजही बघायला मिळते.
यापुडे मात्र मंदीर हे फक्त देवाचे गृह न रहाता त्याला प्रासादाचे म्हणजे राजवाडयाचे स्वरुप मिळाले. राजा हा विश्वातील महत्वाची कार्ये करणार्या आठ देवांचा म्हणजेच लोकपालांचा पृथ्वीवरील प्रतिनिधी आहे, अशी समजुत होती. त्यामुळे राजा हे देवांचा प्रतिनिधी असून प्रासादात रहातो, तर देवाचा निवास अस्णारे मंदीर हे अनेकमजली असावे हि स्संकल्पना ओघाने आलीच. देवाची दिनचर्याही राजाशी मिळतीजुळती ठेवण्यात आली. उदा. दर चार घटकानंतर देवळात नगारा वाजवण्यात येउ लागला. यालाच चौघडा म्हणतात. भुपाळ्या म्हणून त्याला उठवणे व रात्री झोपवणे, रात्री नैवेध्द्य दाखवणे, त्याची संगीत व नृत्याद्वारे करमणुक करणे हे दिनचर्येचे भाग होते. या सर्व उपचारांना अंगभोग आणि रंगभोग अशी नावे आहेत. देवाला असे राजाचे स्वरुप प्राप्त झाल्यामुळे पुजाविधीमध्ये अनेक राजोपचारांचा समावेश झाला. हे सर्व राजोपचार यथासांग पार पडावेत यासाठी मंदीराच्या तलविन्यासात काही बदल घडून आले. मंडप आणि गर्भगृह याच्यामध्ये अंतराळाची योजना करण्यात आली. आणि मंडपामध्ये नृत्याकरिता एका चौकाची म्हणजे रंगमंड्पाची भर पडली. देवाचा निवास अनेक मजली असावा अशी अपेक्षा असली तरी दरखेपेला असे अनेक मजली मंदीर बांधणे शक्य नव्हते, मग त्यावर मार्ग म्हणून शिखर अनेकमजली उभारण्याची संकाल्पना पुढे आली. तसेच गर्भगृहाच्या दोन्ही बाजुला द्वारपाल किंवा प्रतिहारी आले.
मंदीर विकासाच्या या पुढच्या टप्प्यात खुद्द ब्रम्हांडाचे प्रतिक बनले. इ.स. दहाव्ता ते अकराव्या शतकात मंदीराचे गर्भगृह हे देवाचे शरीर मानल्यामुळे मंदीराच्या नाहेर व आतल्या बाजुला त्या देवयेच्या परिवरातील देवता कोरण्यात आल्या. मंदीराच्या विकासाच्या पुढच्या टप्प्यात मंदीर नगराचा उद्य झाला. मंदीराच्या तटबंदीत संपुर्ण शहर वसवले जाई व मुख्य मंदीर नगराचे केंद्र बनले.
पुर्णपणे विकसित न्ण्दीरात अनेक गोष्टींची भर पडल्यामुळे त्यामध्ये भारतीय किंवा हिंदु जीवनाचे घटक, त्यातील फेरफार हे सर्व दिसून येतात. अर्थात मंदीर स्थापत्याच्या विकासाचे हे टप्पे भारतातील सर्व मंदीराचा विचार करुन मांडल्ले असल्यामुळे वरील स्थापत्याच्या विकासाच्या अवस्था दिसणारी मंदीरे महाराष्ट्रात दिसतील असे नाही. मंदीर स्थापत्याच्या सुरवातीच्या कालखंडात जे तंत्र स्थपतींनी वापरले ते समजावून घेणेही महत्वाचे आहे. इ.स.पहिले शतक ते दहावे शतक म्हणजे सातवाहन आणि कुषाण काळ यामध्ये मंदीराच्या बांधकामासाठी पक्क्या वीटांचा वापर केलेला दिसतो. दहाव्या शतकापर्यंत हे तंत्र विकसित होत गेले. यामुळे काही उंच आणि भव्य मंदीरे याच वीटांचा वापर करुन बांधली.
No comments:
Post a Comment