Saturday, February 27, 2021

सदानंदगड

 सर्वसामान्य पर्यटक असो कि नियमित दुर्गभटके या सर्वांपासून दुर्लक्षित आणि अज्ञात असे काही किल्ले महाराष्ट्रात आहेत. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील देवगड तालुक्यातील सदानंदगड त्यापैकी एक. हा किल्ला रामगडापासून १२ ते १३ कि.मी. अंतरावर आहे. १९८६ साला पर्यंत सदानंदगडाची माहिती कोणालाही नव्हती. आजही या दुर्लक्षीत किल्ल्याची माहिती अनेकांना नाही. सदानंदगडाच्या परिसरातील गावांमधेसुद्धा किल्ला म्हणून तो डोंगर प्रसिद्ध नाही. 
     फोंडा घाटात उगम पावणारी आचरा नदी साधारण ६० कि.मी.प्रवास करत आचरा येथे अरबी समुद्राला मिळते. समुद्रापासून साधारण ३५ कि.मी.आत आचरा नदीकाठी असलेले साळशी गाव मध्ययुगीन काळात बंदर म्हणुन प्रसिध्द होते. बंदराहुन घाटावर जाण्यासाठी फोंडाघाट हा जवळचा घाटमार्ग होता. या साळशी गावामागे असलेल्या झाडीभरल्या टेकडीवर सदानंदगड नावाचा अपरीचीत व दुर्लक्षीत किल्ला आहे. या गावाचा कागद पत्रातून ‘ साळशी महाल ‘ असा इतिहासमध्ये उल्लेख पण आहे. ८४ गाव अधिपत्या खाली असल्याने मुख्य गाव म्हणून साळशी गाव महत्व प्राप्त झालेइतिहासाच्या पानात साळशी व सदानंदगड नावाने क्वचित आढळणारा हा किल्ला अलीकडील काळापर्यंत कोणाला माहीत नव्हता. आजही या किल्ल्याची माहिती अनेकांना नाही. ब्रिटीश गॅझेटीयरमध्ये देखील या किल्ल्याची नोंद दिसुन येत नाही. 

     रामगडमधून एक रस्ता शिरगावकडे जातो. या मार्गावर गोठणे, सांडवे, कुवळे अशी गावे लागतात या मार्गावर एस.टी. बसेस मर्यादीतच आहेत. स्वत:चे वाहन सोयीचे पडते.सदानंदगडाच्या परिसरातील गावांमधेसुद्धा किल्ला म्हणून तो डोंगर प्रसिद्ध नाही. याशिवाय मुंबई गोवा मार्ग याने तळेरे – कणकवली नांदगाव असे येता येईल. गड पायथ्याचे साळशी गाव २०कि . मी .अंतरावर आहे ( नांदगाव -शिरगाव – साळशी ) मिळेल त्या वाहनाने साळशी गाठावे.साळशी हे किल्ल्याच्या पायथ्याचे गाव कणकवली पासुन २० कि.मी.अंतरावर असुन साळशी व अलीकडील कुवळे गावातुन गडावर जाण्यासाठी वाटा आहेत.   रामगड ते कुवळे हि वाट अतिशय निसर्गरम्य आहे.या वाटेने कुवळे गावात आपण केव्हा दाखल होतो ते आपणास समजत नाही. कुवळे हे कोकणातील ईतर गावाप्रमाणेच वाड्यांनी बनलेले आहे.या मार्गावर एस.टी. सेवा मर्यादीत असल्याने स्वत:चे वाहन सोयीचे पडते. साळशी व कुवळे या दोन्ही वाटांनी गडावर जाण्यासाठी साधारण एक तास लागतो. गडावर असलेल्या दाट झाडीमुळे वाट चुकण्याची शक्यता असल्याने सोबत वाटाड्या असणे गरजेचे आहे. 
       आपण कुवळे गावातून जाणार्‍या वाटेची माहिती घेउ. कुवळे गावात प्रवेश केल्यावर डावीकडे बौद्घवाडीकडे जाणारी वाट आहे तर उजव्या हाताची वाट एका चार-पाच घरांच्या वस्तीकडे जाते.यातील एका घराजवळची वाट पठारावर चढते.या वाटेने वीस-पंचवीस मिनीटात आपण कातळकोरीव पायर्‍याजवळ येतो.या पायर्‍या प्राचीन आहेत असे लक्षात येते.मात्र गावातील लोकांना या गडाच्या अस्तित्वाविषयी खात्री नाही.त्यांच्या मते या पायर्‍या वरच्या पठारावरुन पलीकडे जाण्यासाठी कोरल्या आहेत.कुवळेगावाच्या पुढे सदानंदगडाचा डोंगर आहे. पुर्णपणे झाडीने झाकल्यामुळे त्याचे गडपणही हरवून गेले आहे. इथून आपण वरच्या बौध्द वाडीजवळ येतो. इथून कच्च्या रस्त्याने अर्धा तास चाललयानंतर मोठा रस्ता संपतो व पायवाट सुरु होते.या वाटेने सडे देवीच्या डोंगराजवळ कातळात खोदलेल्या रुंद पायर्‍याजवळ येउन पोहचतो. या पायर्‍या वरच्या पठारावर घेउन जातात.वर कुकटबाव नावाची विहीर असून या विहीरीला आत उतरायला पायर्‍या आहेत.
या बावेत बारमाही पाणी असते.दुसर्‍या विहीरीत मात्र पाणी नसते. अर्थात हा सर्व परिसर म्हणजे किल्ला नव्हे.कुवळे गावातून आणखी एका पठारावर संदानंदगड आहे.पण गावकरी गैरसमजाने या सडे डोंगरावर जाण्यास सांगतात. सदानंदगडाच्या पश्चिम पायथ्याशी कुवळे गाव तर उत्तर पायथ्याला साळशी गाव आहे.सदानंदगडावर चढण्यासाठी कुवळे गावातून रस्त्याने उतरत नदी किनार्‍याने वाडीत जायचे.विशेष म्हणजे कोकणातील नदी असूनही आचरा नदीला एन उन्हाळ्यातही पाणी असते.पुढे जांभ्या दगडात बांधलेल्या पायर्‍या दिसतात्,त्याने चढ्त राहीले कि पायवाट लागते.आडव्या येणार्‍या ढोरवाटा सोडायच्या आणि सरळ चालत रहायचे.
दहा मिनीटात आपण गडाच्या कातळकोरीव पायर्‍याशी पोहचतो.या रुंद पायर्‍या चढून गडमाथ्यावर यायचे.गडाच्या प्रवेशद्वाराचे तुरळक अवशेष दिसतात.  
 
 
तटबंदीही थोडीफार तुटक तुटक दिसते.गडावरील तटबंदी व इतर वास्तू कालौघात नष्ट झाल्याचे आढळते. मात्र बालेकिल्ल्यावर पाण्याच्या दोन विहीरी आहेत. त्यात दगडमाती पडल्याने त्याही बुजत चालल्या आहेत.पहिली विहीर लगेचच दिसते.साधारण वीस फुट लांब्,रुंद अशी हि विहीर पंचवीस फुटाच्या आसपास खोल होती.इथुन दहा मिनीटाच्या अंतरावर दुसरी विहीर आहे.हि विहीरही मोठी आहे.मात्र या विहीरीतही पाणी नाही.
त्यामुळे गडावर जाताना पुरेसे पाणी सोबत ठेवणे आवश्यक आहे.
 
जवळच एक गुहा असून आतमध्ये गणेश मुर्तीची स्थापना करण्यात आली आहे.
गडाच्या उत्तर टोकावर काही चौथरे बांधले आहेत.गडावर मानवी वावर फारसा नाही,अस्ताव्यस्त पसरलेले पठार आणि दाट झाडी यामुळे ईथे बिबट्यासारख्या वन्य प्राण्यांचा वावर आहे.कुवळे गावाकडून चढून साळशी गावाकडे उतरता येईल.
 
गडाच्या उत्तर बाजुलासुध्दा कातळकोरीव पायर्‍या आहेत्,त्याने साळशी गावात उतरता येईल.गडाच्या या बाजुला मुख्य दरवाजा होता जो नष्ट झाला आहे.ईथली तटबंदी देखील नष्ट झाली आहे.
 
तटबंदीतील एका कोनाड्यात 'दुरुचा चाळा' हा दगड रुपातील देव आहे.दुर्लक्षित अशा या दुर्गावर सध्या "मावळे आम्ही स्वराज्याचे संघ" हि संघटना दुर्गसंवर्धनाचे कार्य करीत आहे.त्यांचा संपर्क क्रमांक 082862 17176. या संघटनेने अतिशय उत्तम कार्य केले आहे.गडावरचा तलाव आणि विहीरीची स्वच्छता, दरवाज्याची साफसफाई यात शक्य ते संवर्धनाचे कार्य केले आहे.त्यांनी केलेल्या कार्याचे फोटो बघता येतील.
 









सदानंदगडासारख्या उपेक्षीत किल्ल्याची भ्रमंती येथील निसर्गरम्य परिसरामुळे आपल्याला वेगळाच आनंद देवून जातो.
  अतिशय अनवट या किल्ल्याला इतिहास मात्र आहे. साळशी गावात पावणाई व सिद्धेश्वर हि दोन सुंदर मंदिरे असुन पावणाई मंदिराच्या आवारात दोन उलट पुरलेल्या तोफा पहायला मिळतात. मंदीर परिसरात मोठया प्रमाणात नवीन जुन्या समाधी दिसुन येतात. साळशी हे प्रमुख शहर व व्यापार पेठ असल्याने साळशी गावामागे असलेल्या डोंगरावर करवीरकर संभाजीराजे यांनी १७३० मध्ये सदानंदगड बांधला अथवा याची पुनर्बांधणी केली असावी. सन १७१२ मधील एका कैफियतीत "दाभोळ वेंगुर्ले सोबत साळशी बंदर विजापुरच्या ताब्यात होता" असे म्हणले आहे. आदिलशाही काळात १५७० साली साळशीचा ठाणेदार खान असल्याचा उल्लेख येतो. त्यानंतर आदिलशाही सरदेशमुख जानातराव यांच्या ताब्यात असलेला साळशी महाल इ.स. १६६१ ते ६४ दरम्यान मराठयांच्या ताब्यात आला. त्यानंतर १६८५ दरम्यान सरदार चंद्राजी घाटगे यांनी साळशी गावातील देवस्थानाला सनद दिल्याचा उल्लेख येतो. राजाराम महाराजांच्या काळात एप्रिल १६९३ मध्ये साळशीची सरदेशमुखी रामचंद्रपंत अमात्य यांना देण्यात आली. सन १७०७ मधील मराठा राज्याच्या वाटणीनंतर सावंत करवीरकराना सामील झाले पण शाहु महाराजांना आपण त्यांच्याशी एकनिष्ठ असल्याचे सांगत त्यांच्याकडून साळशी महालाचे अर्धे उत्पन्न वसुलीची सनद घेतली. आंग्रे व सावंत यांच्यात असलेला वादात या साळशी गावाच्या उत्पन्नावरुन कटकट निर्माण झाली.चकमकी होउ लागल्या.एकमेकांचे लोक कैद करण्यात आले.तेव्हा सावंतांच्या तक्रारीवरुन शाहु राजेंनी कान्होजी आंग्रे यांना ११ मार्च १७२४ रोजी लिहीले "तुमचा त्यांचा ( सावंतांचा ) एक्यभाव करावा.तुम्ही त्यांचे मुलुखास उपद्रव न द्यावा,त्यांनी तुमच्या प्रातांत धामधुम न करावी.सालसी येथील निमे एवज तुम्ही घ्यावा निमे त्यांनी घ्यावा असा सिध्दांत करुन तुम्हास आज्ञापत्र पाठविले वर रघुनाथ हरी बरोबर स्वमुखे आज्ञा सांगून पाठविली.त्यावरुन तुम्ही मान्य केले.त्यांनीही मान्य करुन मुलुखात उपद्रव करीत होते तो राहिवला."
 "असे असता सांप्रत सालसी महाली तुम्हाकडील धामधुम होते.एसास स्वामीनी तह करुन दिला आहे.त्याप्रमाणे वर्तणुक करणे,तुम्ही त्याच्या मुलुखास उपद्रव न देणे ते तुमच्या मुलुकास उपद्रव करणार नाही.सालसी महालाचा एवज आपले कारकून ठेवून निमेनिमेप्रमाणे येणे.पुढे त्यांच्या तुमचा हर्षमर्ष न वाढे तो अर्थ करणे. जेणे करुन मुलुकाची आबादानी होय.स्वत सुखी राहे ते गोष्टी करणे"
   अश्या रितीने साळशी गावातून आंग्रे व सावंत निम्मे निम्मे उत्पन्न घेउ लागले. २३ एप्रिल १७३१ रोजी झालेल्या वारणेच्या तहानुसार साळशी ते अंकोलेपर्यंतचा प्रदेश करवीर करांच्या ताब्यात आला. अर्थात तहानुसार साळशी महाल करवीरकरांकडे आला तरी तसाही तो त्यांचे चाकर सावंताकडे होताच. मात्र तहापुर्वीच साळशी महाल करवीरकर संभाजी राजे यांनी सावंताकडून ताब्यात घेतला व या काळातच साळशीच्या संरक्षणासाठी जवळच्या पठारावर सदानंदगड बांधला गेला.कदाचित आधीच अस्तित्वात असलेल्या गडाची पुनर्बांधणी केली असेल.सन १७३२ साली सदानंदगडाचे बांधकाम पुर्ण झाले.
  याचा उल्लेख संभाजी राजे यांनी ५ सप्टेंबर १७३२ रोजी घोणसरीचे गावकरी व मिरासींना लिहीलेल्या पत्रात सदानंदगडाच्या बांधणीचा उल्लेख असा केला आहे "किले सदानंदगड नवा वसवला आहे.त्याचे बेगमी बध्दल मौजे घोणसरी पेशजीच्या मुकासी याकडून दुर करुन हाली किल्ले सदानंदगडाकडे मुकासा दिल्हा असे".
तसेच तालुका सौंदलमधून गावगन्ना पट्टी बसवून एक हजार रुपये सदानंदगडाच्या बेगमीस लावून दिल्याबध्दल संभाजी राजेंनी सौंदलच्या देसाई व कुलकर्णी यांना पाठविलेल्या आज्ञापत्रात उल्लेख असा "किले सदानंदगड नवा वसवून तेथे राजश्री गोपाल रामराव मुतालिक दिमत अमात्य यांस ठेविले आहेत.तेथील बेगमी जाली पाहिजे" तसेच तर्फ साळशी मधील आरे,एनल्,तोंडवळी इत्यादी गावचा वसूल सदानंदगडाच्या तनख्याकरिता पाठवीत जाणेबध्दल व दुसरीकडे एक रुका वसुल न देणेबध्दल आज्ञा दिली होती.व खारेपाटण तालुक्यातून हजार रुपये वसुल करुन गडाकडे पाटविणंयास सांगितले होते.तसेच गोपाळ रामराव यांना सांगितले कि गडाच्या वसुली करताना रांगणाच्या तनख्येसाठी नेमलेल्या गावांना उपसर्ग देउ नये.
करवीरकरांनी साळशी महाल ताब्यात घेउन तिथे सदानंदगड बांधल्यामुळे सावंतांची मात्र अडचण झाली.कारण जरी सावंत करवीरकरांचे नोकर असले तरी ते नेहमी करवीरकरांच्या मुलुखावर हल्ला करित.इ.स.१७३२ साली फोंड सावंतानी सदानंदगडावर हल्ला केला पण संभाजी राजेंनी भगवंतराव आमात्यांना आज्ञा देउन सावंताना रोखण्यास सांगितले. अमात्यांचे सरदार गोपाळ रामराव यांचे सैन्य आल्याने सावंतानी माघार घेतली. सदानंदगडाच्या पायथ्याचा साळशी महाल समृध्द असताना गडाला मुलुख म्हणून लांबवरचा घोणसरी व फोंडाघाट का जोडला हा प्रश्नच पडतो.या परिसरात शिवगड आहेच.कदाचित सावंत व आंग्रे यांना साळशी महालाचे उत्पन्न निम्मे निम्मे वाटून घेण्यास सांगितले म्हणून अधिकचा उत्पन्नाचा स्त्रोत म्हणून असे केले असावे हि एक शक्यता.
   विजयदुर्गच्या साक्षीने तुळाजी आंग्रेना बुडवून नानासाहेब पेशव्यांनी त्याला कैदेत टाकलयावर साळशीवरील आंग्रेंची सत्ता संपुष्टात आली.इ.स.१७५६ मधील तुळाजी आंग्रे यांच्या पराभवानंतर त्याच्या अमलाखालील साळशीचे अर्धे वतन पेशव्यांच्या ताब्यात आले पण करवीरकरांचा निम्मा हक्क अबाधित होता.त्यांनी तो सिंधुदुर्गास जोडला होता.सन १७६५-६६ च्या पत्रात उल्लेख असा "इंग्रजांतर्फे मालवणाकडील ( यावेळी इंग्रजांनी सिंधुदुर्ग ताब्यात घेतला होता ) सदाशिव नारायण यांजकडून साळशी महाला उपद्रव जाहला.सबब त्यास कैद करुन ठेवले आहे.त्यास सोडून साळशी महालाचा मालवण तर्फेचा हिस्सा चालत आहेत.त्याप्रमाणे मालवणास देत जाणे.इंग्रजांचा व सरकारचा ( पेशवे ) घरोबा.सबब सोडणे लागणे".
     लवकरच सावंतानी हा प्रदेश ताब्यात घेतला. इ.स.१७८५ साली पेशवे व करवीरकर यांच्या संयुक्त स्वारीत सावंतांचा पराभव झाला व साळशी महाल पेशव्यांच्या ताब्यात आला. इ.स. १८०५ साली चिटकोपंत हे पेशव्यांचे साळशी येथील अमंलदार होते. इ.स.१८१८ साली साळशी महाल इंग्रजांच्या ताब्यात आला.मात्र यासुमारास सदानंदगड बहुधा पुर्णपणे बेवसावू झाला असावा,करण त्याचा कोठेच उल्लेख मिळत नाही.अगदी इंग्रजांनी लिहीलेल्या गॅझेटियरमध्येही सदानंदगडाचा उल्लेख नाही.अश्याप्रकारे सदानंदगडावरील आनंद संपुन तो विजनवासात गेला तो आजअखेर.
        सदानंदगडावर आज पहाण्यासारखे अवशेष फारसे उरले नसले तरी या परिसरात भेट द्यावी अशी दोन ठिकाणे नक्की आहेत.एक म्हणजे आदिमानवाने काढलेले कातळचित्र आणि साळशी गावातील सिद्धेश्वर पावणाई मंदिर.

कातळशिल्पा उर्फ पेट्रोग्लिफ्स :- 

        आदिमानवाच्या पाऊलखुणा आता कोकणच्या माळरानावर सापडू लागल्या आहेत. देवगड तालुक्यातील साळशी गावच्या माळरानावर कोरीव कातळशिल्प आढळून आले आहे. ऐतिहासिक वारसा असलेल्या साळशी गावाचे यामुळे महत्व आणखी वाढले आहे. पुराणात सप्त पाताळांचा उल्लेख सापडतो. त्यामुळे या ठिकाणी कैक वर्षांपासून प्रगत लोकवस्ती असल्याचे यामुळे समोर येत आहे. ( Rock sculptures found in Salashi village of Sindhudurg district)
प्रागैतिहासिक काळातील संस्कृती?
   कातळशिल्पाच्या माध्यमातून अधोरेखित झाली आहे. आदिमानवाने विविध शिल्पे दगडात कोरून ठेवलेली आहेत. ती कशाची चित्रे आहेत, त्यातून काय व्यक्त होते हे सांगणे अवघड असलेतरी विविध प्राणी, पक्षी अथवा काही अगम्य नक्षीकाम अशी ती खोदचित्रे कोरली आहेत. जगभरात अशा प्रकारच्या शिल्प किंवा चित्रांना रॉक आर्ट किंवा पेट्रोग्लिफ्स या नावाने ओळखले जाते. मुख्यत्वे लेण्यांच्या भिंतींवर केलेले कोरीव काम सर्वत्र आढळते; परंतु संपूर्णपणे उघड्यावर असलेल्या कातळावरील ही खोदचित्रे महाराष्ट्रात विशेषेकरून कोकणातच पाहण्यास मिळतात.
  कोकणात विशेषतः रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील काही गावांमध्ये अशी शिल्पे आढळून येत आहेत.मात्र, देवगडमधील साळशी गावाच्या माळरानावर सापडलेल्या कातळशिल्पा बरोबरच या गावाला ऐतिहासिक महत्व देखील आहे. हे गाव आदिलशाहीपासून तालुक्याचं ठिकाण म्हणून ओळखलं जात होत. स्वराज्यात सामील झाल्यानंतर या गावाचा दबदबा आणखी वाढला. याठिकाणचे पावणाई देवीचे मंदिर हे ८३ खेड्यांचे अधिपती असलेले देवस्थान म्हणून ओळखले जाते. मंदिराची भव्यदिव्यता इतिहासाच्या पार्श्वभूमीची साक्ष देतात. याशिवाय अनेक अशा ऐतिहासिक पाऊलखुणा या भागात सापडत, असल्याची माहिती संतोष गावकर यांनी दिली आहे. कातळशिल्पांच्या संवर्धनासाठी प्रयत्न करणार असल्याचेही गावकर यांनी सांगितले. ( Rock sculptures found in Salashi village of Sindhudurg district)
  साळशीच्या माळावर आता आदिमानवाच्या पाऊलखुणांची साक्ष देणारे कातळशिल्प सापडले आहे. विशेष म्हणजे शिल्पाच्या बाजूला काही अंतरावर भलीमोठी कातळात कोरलेली गुहादेखील आहे. त्यामुळे या ठिकाणी आदिमानवाची वस्ती असल्याचे जाणकारांचे म्हणणे आहे.

   साळशीत सापडलेल्या या कातळशिल्पामुळे हा अश्मयुगीन ठेवा असू शकतो त्यामुळे यावर संशोधन होऊन साळशी गाव पर्यंटन दृष्ट्या जगाच्या नकाशावर येण्याची गरज आहे.
     कोकणात सिंधुदुर्ग आणि रत्नागिरीमध्ये यापूर्वी कातळशिल्प आढळली आहेत. साळशी गावातील युवकांना कातळशिल्प आढळली आहेत. आजूबाजूच्या कातळशिल्पांचा पर्यटनाच्या दृष्टीनं विचार करणं गरजेचे आहे, असं प्रणव नाडनकर यांनी सांगितले. ( Rock sculptures found in Salashi village of Sindhudurg district)

संत सिद्धेश्वर पावणाई देवस्थान :- 

देवगड-निपाणी या मार्गावरील शिरगांव या मध्यवर्ती गावापासून सहा कि.मी. अंतरावर असलेल्या साळशी या निसर्गरम्य गावाच्या मध्यभागी प्राचीन कलाकुसरीची साक्ष देत उभ्या असलेल्या वास्तूमध्ये साळशीचे पुरातन प्रसिद्ध इनाम देवस्थान श्री संत सिद्धेश्वर पावणाई उभे आहे.खारेपाटणजवळच्या पियाळी नदीपासून कणकवली येथील गडनदीपर्यंत आणि सहय़ाद्री पायथ्याच्या कुंभवडे (ता. कणकवली) पासून ते आचरा, कुणकेश्वर, देवगड या अरबी समुद्रापर्यंतची ८४ खेडी तथा देवस्थाने साळशी येथील ‘श्री देव सिद्धेश्वर आणि श्री देवी पावणाई’ या देवस्थानांच्या अखत्यारीत असायची. त्यामुळे या देवस्थानाला चौ-यांशी खेडय़ांचा अधिपती म्हणून संबोधले जाते.
      ही खेडी पुढीलप्रमाणे – वाघोबा (फोंडा), नवलादेवी (नरडवे), पावणाई (दिगवळे), रामेश्वर (नाटळ), दिर्बाई-रामेश्वर (भिरंवडे), गांगो-महालिंग (कुंभवडे), पावणादेवी (हरकुळ-खुर्द), गांगो (घोणसरी), गांगो (लोरे), गांगो (पियाळी), गांगो (मठ-खुर्द), रासाई-सईम (वाघेरी), अनभवणी-गांगो (डांमरे), रामेश्वर (कोंडये), रामेश्वर (करुळ), गांगो (हुंबरट), लिंग रामेश्वर (करंजे), लिंगेश्वर (साकेडी), नागेश्वर (नागवे), रामेश्वर-दिर्बादेवी (सांगवे), लिंगेश्वर (कणकवली), रामेश्वर (हरकुळ ब्रु.), गांगेश्वर (आशिये), कलेश्वर (कलमठ), लिंगेश्वर (जानवली), चंडिकादेवी (वरवडे), भगवती (पिसेकामते), टेवणादेवी (तरंदळे), रवळनाथ (बिडवाडी), नवलादेवी (गोठणे), रामेश्वर (बेळणे बु.), रामेश्वर (श्रावण), जयंती (पळसंब), महालक्ष्मी (आडवली), रामेश्वर (रामगड), गणपती (कोळली), भराडी (बांदिवडे), रवळनाथ (वायंगणी), वाघोबा (वाडीतोंडवली), गांगो (त्रिंबक), माऊली (चिंदर), रामेश्वर (आचरे), गांगो (पोयरे), गांगो (कुडोपी), मार्लेश्वर (बुधवळे), बोभडेश्वर (मठबुद्रुक), रामेश्वर (कुवळे), गांगो (भरणी), धावगीर (माईण), गांगो (सावडाव), पावणाई (बेळणे खुर्द), गांगो (तिवरे), गांगो (बावशी), रामेश्वर (तोंडवली), रामेश्वर (असलदे), गारडी-गांगो (कोळोशी), गांगो (हडपीड), रामेश्वर (नांदगांव), भैरी (ओटव), नागेश्वर (आयनल), गांगो (चाफेड), सिद्धेश्वर-पावणाई (साळशी), पावणाई (शिरगांव), नवलाई (ओंबळ), गांगो (शेवरे), महादेव (वळिवंडे), ब्राह्मण (चांदोशी), पावणी (तळवडे), भावई (वरेरी), स्थानेश्वर (किंजवडे), आरेश्वर (आरे), भगवती (कोटकामते), महादेव (दहिबांव), गांगेश्वर (नारिंग्रे), भगवती (मुणगे), भैरी-काळभैरव (हिंदळे), रामेश्वर (मिठबांव), कुणकेश्वर (कुणकेश्वर), मुंबरेश्वर (मुंबरी), लक्ष्मी (इळये), संतपुरुष (दाभोळे), कवळादेवी(टेंबवली), दिर्बादेवी (जामसंडे), नारायण (मालडी).
  तत्कालीन ‘साळस महाल’ हे तालुक्याचे ठिकाण असल्याने मुख्य बाजारपेठही साळशी या ठिकाणी भरत असे. त्यावेळी या महालात दहा-पंधरा हजार लोकवस्तीचा समावेश होता. या महालात बारा बलुतेदार होते. मुख्य बाब म्हणजे या महालाच्या नावाने ओळखली जाणारी वजने, मापे आजही शाबूत आहेत. विशेषत: ‘साळशी पायली’ हा शब्दप्रयोग संपूर्ण जिल्हय़ात प्रचलीत आहे.
   संपूर्ण साळशी गाव, येथील सदानंद गड आणि श्री देव सिद्धेश्वर-पावणाई देवस्थानांबाबत अनेक आख्यायिका आणि दंतकथा सांगितल्या जातात. सदानंद गडाचा इतिहास पाहता साळशी गाव इ. स. ७०० ते ९०० या सालात झाले असावे, कारण सदानंद गड इ. स. ११००च्या दरम्यान बांधला गेला असे उल्लेख सापडतात.
 साळशी गावातील वयोवृद्ध जाणकार आणि या देवस्थानचे अभ्यासक अनंत गोविंद गांवकर यांनी दिलेल्या माहितीनुसार इ. स. १५०० दरम्यान पैठण येथून मिराशी घराणे कोंकणात दाखल झाले. मिराशी घराण्याचे गांवकर आणि नाईक हे बंधू होत. या मिराशी घराण्याने आपली कुलदेवताही साळशी या ठिकाणी वसवली. स्वामी छत्रपती शंभूराजे यांनी हा गाव या देवतेस इनाम दिला. श्रीयुत अमात्य यांना कोल्हापूरच्या राजांनी बावड जहागिरी दिली. यावेळी हा पूर्ण साळस महाल अमात्य यांच्या ताब्यात गेला. भगवंतराव अमात्य यांनीही साळशी येथील श्री देव सिद्धेश्वर पावणाईला सनद दिली होती.
  पेशवाई सन १८१८ मध्ये खालसा झाली. कोल्हापूरचे स्वामी छत्रपती शंभू राजे यांनी दिलेली सनद ग्राह्य मानून ब्रिटिश सरकारने ३० ऑगस्ट, १८६४ मध्ये ही सनद दिलेली आहे. ही सनद व्हिक्टोरिया राणीच्या वतीने त्यावेळच्या मुंबई इलाख्यातील गव्हर्नर इन कौन्सिल यांच्या हुकुमाने व त्यांच्या सहीनिशी देण्यात आलेली आहे.
   शिरगांव येथून ‘साळशी’ गांवात प्रवेश करताच या देवस्थानच्या अनेक प्राचीन वास्तू आपले लक्ष वेधून घेतात. या प्राचीन वास्तूंमध्ये इनाम देवस्थान श्री देव सिद्धेश्वर व देवी पावणाई ही प्रमुख मंदिरे आहेत. श्री  देव सिद्धेश्वर मंदिर भव्य असून या मंदिरात शिवाचे वाहन असलेल्या ‘नंदी’ याची महाकाय अशी दगडी मूर्ती आहे. या दगडी मूर्तीबाबत असे सांगण्यात येते की, सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये अन्यत्र कोणत्याही शिव मंदिरात एवढा मोठा नंदी पाहावयास मिळत नाही.

  या मंदिरात शिवाची मोठी पिंडी असून गाभा-याच्या बाहेरील चौकात गणपती व अन्य मूर्तीचीही प्रतिष्ठापना करण्यात आली आहे. या देवतेच्या पूजाविधीसाठी ब्राह्मण किंवा लिंगायत गुरव यांच्या व्यतिरिक्त कोणीही पूजारी म्हणून काम पाहत नाही. या मंदिराचे वैशिष्टय़ म्हणजे विजयादशमी याच दिवशी फक्त भाविकांना गाभा-यांपर्यंत प्रवेश मिळतो. अन्य वेळी बाहेरील चौकातून दर्शन घेता येते.
  या देवस्थानातील सर्वात मोठे व प्राचीन कलाकुसरीने सजवलेले आकर्षक असे मंदिर म्हणजे श्री देवी पावणाई मातेचे मंदिर. या मंदिराचा गाभारा, तरंग भाग व भव्य सभामंडप असे प्रमुख भाग आहेत. गाभा-यात देवीची मूर्ती असून त्याचबरोबर शिव (बाबा), शक्ती काळकाय (कालिका माता) यांच्याही प्रतिमा आहेत. बहुधा देवीची मूर्ती राजस्थानी शिल्पांतील असावी असे गावातील वयोवृद्ध जाणकार सांगतात.
  सभामंडपाच्या दरवाजातून देवीचे मनोहारी दर्शन घडते. या मूर्तीबाबत कोल्हापूर येथील श्री देवी अंबाबाईची मूर्ती, तुळजापूरची भवानी  माता आणि या ठिकाणची श्री देवी पावणाई या तिन्ही मूर्तीच्या जडणघडणीत साम्य आढळते. श्री देवी पावणाईची मूर्ती मात्र गावांतील कारागिराने घडविली असल्याचे गावातील जाणकारांचे मत आहे.
  श्री देवी पावणाईचे हे प्राचीन मंदिर प्रचंड असून लाकडी खांबांनी तोललेली तक्तपोशी आहे. प्रत्येक खांबाचा वरचा निम्मा भाग कोरीव, नक्षीकामयुक्त आहे. तसेच दरवाजाच्या चौकटीवरही कलाकुसर लक्ष वेधून घेते. श्री देवी पावणाई व श्री देव सिद्धेश्वर या दोन्ही देवालयांत सततचा नंदादीप तेवत असतो व अंध:कार नाहीसा करण्याचा संदेशच तो देत असतो.
   तत्कालीन ‘साळस महाला’तील व आताच्या देवगड, कणकवली व मालवण तालुक्यातील चौ-यांशी खेडय़ातील भाविक आपल्या शुभ कार्याप्रसंगी तसेच सण समारंभावेळी या देवीला श्रीफळ ठेवून अभय मागतात. पूर्वी या मंदिरात गावाचे न्याय होत होते. श्री देव सिद्धेश्वर व श्री देवी पावणाई मंदिराच्या चारही बाजूला तटबंदी आहे. तसेच मधला भाग चि-यांनी फरसबंद केला आहे. या प्रशस्त आवारातून या देवीची पालखी फिरते. तसेच दोन्ही मंदिरांच्या एका बाजूला प्राचीन शिल्पांची आठवण करून देणा-या भव्य दीपमाळा व प्रशस्त तुळशीवृंदावने आहेत.
   यात्रेकरूंसाठी धर्मशाळाही अस्तित्वात आहे. याच धर्मशाळेजवळ पुरातन दोन ऐतिहासिक तोफाही उभ्या असल्याची साक्ष देतात. तसेच पराक्रमी पुरुषांच्या स्मृतिप्रित्यर्थ छोटी-मोठी स्मारकेही आहेत. धार्मिक कार्याप्रसंगी त्या स्थानांना वेगवेगळय़ा प्रकारे महत्त्व देण्यात येते. तसेच श्री देव रवळनाथ व श्री देवनाथ ही दोन नाथ संप्रदायातील मंदिरेही आढळतात. गावाच्या परिसरात जैन सांप्रदायातील मंदिरेही आहेत.
   पूर्वी जैन लोकांची वस्ती या भागात होती असे सांगितले जाते. या मंदिर परिसरात जैन मूर्ती येथेही आढळतात. तळखंबा-वशिक, गांगो, इटलाई, बाणकी देवी, धुरी ब्राह्मण देव, बांदा ब्राह्मण देव, सत्पुरुष ठिकाण, हनुमान मंदिर, दत्त मंदिर, श्री देव वटेश्वर अशी लहान-मोठी मंदिरे या परिसरात आहेत. त्या त्या ठिकाणचे मानकरी त्या त्या देवांची पूजा-अर्चा करतात.
   श्री देव सिद्धेश्वर आणि श्री देवी पावणाई देवस्थानचा विजयादशमी उत्सव इतिहास कालीन राजवैभवाच्या थाटात पार पडतो. घडशीवादनांसाठी नाशिकहून धुमाळ खास उपस्थित असतात. वाद्यांच्या गजरात निशाणे, मशाली, पालखी, चौरवी, तरंग, भालदार, चौपदारांसह भाविकांचा प्रचंड लवाजमा सिमोल्लंघनासाठी अरुंद चढणीतून जातो व सोन्याची लयलूट करून परततो. ही एक आनंदाची पर्वणी असते.

संदर्भग्रंथ :-
१) गड्,किल्ले सिंधुदुर्ग जिल्ह्यातील- सतिश अक्कलकोट
२) www.durgbharari.com  हि वेबसाईट
३) "मावळे आम्ही स्वराज्याचे संघ" यांचे फेसबुक पेज
४) दैनिक प्रहार यातील पावनाई देवस्थानाची माहिती
५) https://sindhudurglive.com यावरील कातळशिल्पाची माहिती


 




खारेपाटण

      कोकणातील बऱ्याच गावांचा उल्लेख आपण इतिहासात किवा शिवकाळात वाचलेला असतो पण तेथे एखादा किल्ला असावा हे आपल्या खिजगणतीतही नसते. खारेपाटण व राजापुर हि मुंबई - गोवा महामार्गावर असलेली अशीच दोन शहरे. खारेपाटण हे इतिहासप्रसिद्ध गाव आहे. वाघोटन नदीच्या दक्षिणतीरावर खारेपाटण वसलेले आहे. इतिहासकाळात महत्त्वाचे स्थान मिळवलेले खारेपाटण हे पुर्वी देवगड तालुक्याचे मुख्यालय होते. इ.स. १८१८ ते इ.स. १८७५ पर्यंत मुख्य ठिकाण असलेल्या खारेपाटणाला एक किल्ला होता याची माहिती खुद्द खारेपाटणवासीयांनाही नाही याचे मात्र आश्चर्य वाटते.
       खारेपाटण हे सिंधुदुर्ग जिल्ह्यामधे आहे. मुंबई-पणजी हा महामार्ग खारेपाटण जवळून जातो. रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यांच्या सीमा वाघोटन नदीच्या तीरावर येवून मिळतात. मुंबईकडून निघाल्यावर वाघोटन नदी ओलांडताच पहीले गाव खारेपाटण आहे. महामार्गाच्या पश्चिमेकडे वसलेल्या खारेपाटणास कोल्हापूर गगनबावडा मार्गही येता येते.    
          इ.स. ८ व्या शतकात दक्षिण कोकणात शिलाहारांचे राज्य होते. त्याकाळी बलिपत्तन नावाने ओळखले जाणारे खारेपाटण गाव हे शिलाहार राजाची राजधानी होती. खारेपाटण गाव वाघोटन खाडी किनाऱ्यावर वसलेले असुन प्राचिन काळी व्यापारी जहाजे विजयदुर्गाजवळ वाघोटन खाडीत शिरत व तेथून बलिपत्तन गावापर्यंत येत. येथे जहाजातून माल उतरवून तो बावडा, फोंडाघाट मार्गे देशावर पाठविला जात असे. शिलाहार घराण्याचा मुळ पुरुष सणफुल्ल याने राष्ट्रकुटांना बहुमोल सहाय्य केल्यामुळे राजा कृष्ण राष्ट्रकुट याने त्यास बराच मोठा प्रदेश दिला.शिलाहार राजा संणपुल्ल याचा पुत्र धम्मियरने इ. स ७८५ ते ८२० मध्ये बलिपत्तन शहर वसवून त्याला लागून असलेल्या टेकडीवर या प्राचिन बंदराचे व राजधानीचे रक्षण करण्यासाठी खारेपाटणचा किल्ला बांधला.मुळ गाव जरी आधी अस्तित्वात असले तरी त्याला महत्व देण्याचे काम धम्मियरने केले.
  खारेपाटण येथे शिलाहार राजाने दिलेले तीन ताम्रपट मिळाले आहेत. राजा रट्टराजने ( सन ९१५-१०२४ ) दोन ताम्रपट दिले असून पहिला ताम्रपट २२ मे १००८-०९ चा असून यात शिलाहार,राष्ट्रकुट व पश्चिमी चालुक्य यांच्या वंशावळ व दिलेल्या देणग्या आहेत. दुसर्‍या ताम्रपटात दिलेल्या देणग्यांचा उल्लेख आहे.तिसर्‍या ताम्रपटात राजा अनंतपाल यांनी कोकणातील सुपारीक ,श्रीस्थानक,चेमुली व इतर बंदरातून येणर्‍या व जाणार्‍या मालाच्या गाडयावरील आयात व निर्यात कर रद्द केल्याचे जाहीर केले.
     देवगिरीच्या यादवांनी शिलाहाराची सत्ता नष्ट केली. देवगिरी नंतर विजयनगर साम्राज्याची सत्ता आली. मुस्लीम शासनकाळात हा किल्ला आदिलशहाच्या ताब्यात होता. सन १४८४ मध्ये संगमेश्वर येथील मावंलकर देशमुख घराण्यापैकी केशव नायक देशमुखी करत असताना 'नर्मदेपर्यंत सर्व देश विध्यानगरकरांही ( विजयनगर साम्राज्यातील हंपी ) आक्रांत ( पादाक्रांत ) केला. मग केशव नायकाने विद्यानगरास जाउन राजदर्शन घेतले. तळकोकणार सासस्त ( ६६ ) गावची राजसत्ता केली. तिमपा ब्राम्हण खारेपाटणास आणिला.खारेपाट्णी कारभार होय या देशाचे पाटण देश नाव जाह्ले.केशव नायकानंतर या घराण्यात अनेकांनी सत्त्ता भोगली व यादवीला सुरवात देखील झाली.यातून पुढे रंगोबा नायकाने पुढे विजयनगरला जाउन वेकांप्पा अधिकारी खारेपाटणास आणला अशी माहिती मिळते.
       याचा अर्थ विजयनगर साम्राज्यात खारेपाटण शहरास महत्व होते. सन १४७० मध्ये बहामनी सत्तेने कोकण घेतले. त्यासुमारास खारेपाटण बहामनी राजवटीखाली गेले. सन १४९० मध्ये आदिलशहा हा बहामनी राजवटीतून फुटून स्वतंत्र झाल्यावर लवकरच त्याने खारेपाट्ण आपल्या वर्चस्वाखाली आणले. सन १५६५ मध्ये मामले मुज्जफराबाद मध्ये तपे खारेपाट्ण मोडत होता. खारेपाट्णचा उल्लेख खारापाट असा येतो. २ जुलै १६५० मध्ये सिद्दी अजम काजी आल्ली सेर हा खारेपाटणचा किल्लेदार होता. १० नोव्हे १६५९ शिवाजी महाराजांनी अफझलखानास मारल्यावर मराठे कोकणात उतरले.त्यांनी राजापुर घेउन १५ जानेवारी १६६० रात्री दोनशे मराठे सैनिक खारेपाटणच्या किल्ल्याच्या दिशेने गेले आणि फारसा प्रतिकार न होताच त्यांनी किल्ला घेतला. 
राजापूर येथे अटक करण्यात आलेल्या इंग्रज अधिकारी गिफर्ड यास खारेपाटण किल्ल्यातील अंधार कोठडीत ठेवण्यात आले. अफझलखानाचे दभोळ बंदरात असलेले जहाज इंग्रजांनी आत नेउन लपवले होते.ते जहाज जोपर्यंत हवाली करत नाहीत तोपर्यंत इंग्रज कैद्यांना सोडणार नाही असे मराठ्यांनी बजावले.राजापुरच्या वखारीचा इंग्रज प्रमुख रेव्हिंग्ट्न याने १३ फेब्रुवारी १६६० रोजी पत्र लिहीले "अद्याप त्या इंग्रजाला ( म्हणजे गिफर्डला ) खारेपाटणच्या किल्ल्यात कैदेत ठेवले आहे." व त्याच्या सुटकेची विनंती केली.विशेष म्हणजे हे इंग्रज आपल्या देशबांधवाची किती काळजी करित याचे उदाहरण म्हणजे कैदेत असलेल्या गिफर्डसाठी खास राजापुरवरुन मद्य व मास पुरवले जात असे.हा प्रकार महिनाभर चाललाअ.पुढे गिफर्डला खारेपाटण किल्ल्याच्या बाहेर काढून विशाळगड किंवा साटवलीच्या किल्ल्यावर हलविण्यात आले.
        पुढे सन १६६३ रोजी गोव्याहून गिफर्ड त्याच्या सुरतेच्या वखारीला कळवतो 'फोंड्याचे सुभेदार व कुडाळचे देसाई ( सावंत ) यांनी आपली सर्व लहानसहान राजांची ( म्हणजे देसायांची ) सैन्य एकत्र करुन शिवाजीला खारेपाटणमधून काढून लावाले असे आदिलशहाने फर्मावल्याचे कळते.खारेपाटण आता आदिलशहाने महमंदखानाला दिले आहे".
  अर्थात हि माहिती चुकीची असावी कारण वेंगुर्ल्याच्या डचांच्या डाग रजिस्टर प्रमाणे १२ जुन १६६५ च्या पत्राप्रमाणे "डचांचा माल लुटून तो ( म्हणजे शिवाजी महाराज ) आता खारेपाटणास जाउन बसला आहे.".
   सन १६६६ मध्ये कुडाळ व वेंगुर्ला आदिलशहाकडे व खारेपाटण व राजापुर शिवाजी राजांकडे अशी स्थिती होती. एप्रिल-मे १६७४ मध्ये म्हणजे राज्याभिषेकाच्या आधी शिवाजी महाराजांच्या आरमाराचे अधिकारी दर्यासारंग यांंनी भडोच येथील इंग्रजांचे गलबत पकडून खारेपाटण येथे नेउन ठेवले.
   पुढे संभाजी महाराजांच्या काळात सन १६८२ मध्ये तळकोकणातील फितुर झालेल्या देसायांनी गोव्याच्या पोर्तुगीजांना मराठ्यांच्या किल्ल्यांची माहिती पाठविली.त्यात खारेपाटण किल्ल्याची माहिती दिलेली आहे,त्याप्रमाणे खारेपाट्ण किल्ला नदीकिनारी असून तिथे शिबंदी व तोफा आहेत.अर्थात पुढे औरंगजेबाचे सैन्य या प्रदेशात पसरले आणि खारेपाटण किल्ला निश्चित मोघलांकडे गेला असण्याची शक्यता आहे.मात्र हा गड पुन्हा मराठ्यांनी जिंकला असावा, कारण सन १६९३ च्या उल्लेखाप्रमाणे हा गड मराठ्यांच्या ताब्यात होता. 
     सन १७०७ मध्ये औरंगजेब मेला आणि मराठा साम्राज्यावरचे संकट टळले.मात्र मराठा साम्राज्याची दोन शकले होउन सातारा गादी आणि करवीर गादी अशी दोन राज्ये झाली.खारेपाटणचा किल्ला करवीर गादीत मोडत होता. सन १७०८ मध्ये खेम सावंत यांनी सिद सावंत व चांदजीराव आसळेकर यांना खारेपाटणवर पाठ्वून करवीरराज्याचे साठम हे किल्लेदार असताना आक्रमण केले.मात्र याचा उपयोग झालेला दिसत नाही.कारण करवीर संस्थानाचे रामचंद्रपंत आमात्य यांनी १४ मे १७०८ रोजी हिरोजी,बापुजी व प्रतापजी साटम यांना पत्र लिहीले "तुमचा उच्छेद होतो.राजश्री बाबाजी यास खारेपाटणी ठाणेयाची मजबुती करणे म्हणून लिहून पाठविले आहे.तरी तुम्ही जमावानिशी राजश्री रामराव यास अनुकुल होउन खारेपाटणचे ठाणे मजबुत करणे"
   इ.स. फेब्रुवारी१७१३ मधे  बाळाजी विश्वनाथ यांच्या मध्यस्थीने कान्होजी आंग्रे आणि छत्रपती शाहू महाराज यांच्यात झालेल्या सलोख्यात इतर १६ किल्ल्यांबरोबर खारेपाटणचा किल्ला कान्होजीं आंग्रेकडे राहीला. अर्थात    खारेपाटण फक्त कागदावरच आंग्रेयांच्याकडे राहीला,प्रत्यक्ष तो करवीर संस्थानाच्या अधिपत्याखाली होता. आंग्रे आणि सावंत यांच्यात सख्य नव्हते.आंग्र्यांच्या आश्रयाने राहीलेल्या कुडाळच्या देश्स्थ प्रभु यांचा बीमोड करण्यासाठी सावंतांनी खारेपाटणवर हल्ला केला.यात मोठी लढाई होउन बाबाजी प्रभु पडले व इतर देसाई कुडाळला पळून गेले.मात्र सावंतांनी खारेपाटणचा कोट आपल्या ताब्यात घेतला नाही. कन्होजी आंग्रे यांचे चुलत बंधु दत्ताजी आंग्रे यांनी जानेवारी-फेब्रुवारी १७१६ मध्ये खारेपाटणचा किल्ला घेतला.यावर करवीरकर संभाजी राजे १५ फेब्रुवारी १७१६ च्या पत्रात चांदजी राणे यांना लिहीतात "दत्ताजी आंग्रे यांनी खारापाटणची गढी घेउन किले गगनगडचे तनखियाचे ( गडाखालील ) गावी उपद्रव मांडला आहे. तरी तुम्ही आपले कबिले वरघाटी ठेवून किले गगनगडचे लोक व तुम्ही जमावनिसी स्वारी सिकारी करुन गावांस उपद्रव न लागे असे करणे".
      मात्र करवीरकारांना खारेपाटण आंग्र्यांकडून घेता आले नाही, किल्ला आग्र्यांच्याच ताब्यात राहीला. सन १७३४ मध्ये सरखेल संभाजी आंग्रे खारेपाटणला आले.संभाजी नंतर तुळाजी आंग्रे सरखेल बनले. पेशवे व तुळाजी आंग्रे यांच्यात वैमनस्य होते. पेशव्यांना तुळाजीचे किल्ले व आरमार हवे होते.पेशव्यांनी इंग्रजांशी १९ मार्च १७५५ रोजी तह केला.तहानुसार दोघांनी तुळाजीच्या प्रदेशावर स्वारी केली. या स्वारीत पेशव्यांनी तुळाजीच्या खारेपाटणवर चाल केली. यावेळी पेशव्यांचे सरदार रामजी महादेव नेतृत्व करीत होते. सुरवातीला पेशव्यांनी तुळाजीचा पराभव केला.याची माहिती काशी त्रिंबक २४ एप्रिल १७६५ च्या पत्रात देतात "आंगरेयानी दाभोळ सुभा श्रीमंतास दिल्हा. राजापुरची गढी व खारेपाटणची त्यास द्यावी.याप्रमाणे तह झाला".
   मात्र यावर समाधानी न रहाता पेशव्यांना तुळाजी आंग्र्यांचा समुळ नाश हवा होता. यासाठी सन १७५६ च्या पावसाळ्यात पेशव्यांचे सैन्य खारेपाटणच्या भुईकोटाभोवती जमले.या मोहीमेची माहिती कृष्णराव भगवंत पेशव्यांना १५ सप्टेंबर १७५५ च्या पत्रात लिहीतात "आम्हाकडील जमाव येउन खारेपाटणानजीक दोन कोशावरी मेढा घालून जबरदस्तीने राहीले आहेत.येक रोखी शह जाला.यामुळे आंगरे याने अवघा जमाव खारेपाटणी जमा करुन बल धरिले आहे त्यास भारी फौज आलियाविना स्थल हस्तगत होत नाही".यावेळी भयकंर पाउस कोसळत होता. 
    एक खारेपाटणास वेढा दिल्यास किल्ला सर होणे अवघड जाईल कारण आंग्रे आपली सर्व फौज तिथेच एकवटतील. तेव्हा एकाच वेळी त्यांच्या तीन-चार किल्ल्यांना वेढा दिल्यास त्यांची फौज विखुरली जाउन किल्ला हस्तगत करणे सोपे जाईल हे सांगताना कृष्णराव पुढे लिहीतात "त्यास भारी फौज आल्याविना स्थले हस्तगत होत नाही.भारी फौज व आरमाराचे साहित्य आलियानंतर शत्रुचा उपमर्द येथास्थित होईल.येकरोखे शह दिल्याने आयास येत नाही.दोन-च्यार स्थलास शह दिल्यावर दिवसगत लागणार नाही."
  रामजी महादेव १३ ऑक्टोबर १७५५ रोजीच्या पत्रातून पेशव्यांना लिहीतात "खारेपाटणास ( आंग्रे यांचा ) रुद्राजी धुळूप पाचसातशे माणसांनी आहे.प्रस्तुत वलवल करिता रुद्राजी धुळूप करितात.त्यास राउत ( घोडेस्वार ) गेल्यानंतर खारेपाटण साध्य जाहल्यास मुलकी बादेज जाहल्याने साहित्य संरजाम होणार नाही,येथील तेथे भरणा गुंतोण उपराला होणार नाही.खारेपाटणचा बंदोबस्त होउन, दुराख ( दोन्हीकडून ) शह बसला पाहीजे,त्यासी राउतविना मजबुती होत नाही.आंग्रेजांचा माणुस कालजी धरुन साहेबकाम करावे यैसा रवाना केल्यास उत्तम आहे".परंतु रुद्राजी यावेळी किल्ल्यावर नव्हते.
    सरदार जावजी गवळी हे करुळ घाटातून खाली उतरले.याशिवाय जोडीला खंडोजी माणकर्,खंडेराव बर्गे ईत्यादी सरदार होते.दिवसरात्र खारेपाटणवर हल्ले चालु होते.वारंवार छापे टाकण्यात येउ लागले.जावजी गवळी १३ डिसेंबर १७५५ रोजी पेशव्यांना लिहीलेल्या पत्रात उल्लेख करतात "आम्ही मोर्चेवाशी जावे तरी गनिमाचा शह मातबर,मोर्चेयाशी कुमक करुन लष्कर जतन करावे एसा प्रसंग पडला.ठाणेयात ( किल्ल्यास ) दोन तीनशे आरमारी माणुस व तुळाजी कदम आहेत."
    खारेपाटणास पेशव्यांच्या सैन्याचा वेढा बसत आहे असे पाहून तुळाजीने ११ डिसेंबर १७५५ रोजी आपला पराक्रमी सरदार रुद्राजी धुळूप याच्याबरोबर पोर्तुगीज सैन्य आरमारासहीत खारेपाटणला रवाना केले.या दोन्ही फौजात तुंबळ युध्द झाले.मात्र पेशव्यांचे सैन्य वरचढ चढून तुळाजी आंग्र्याचा पराभव झाला आणि पेशव्यांच्या सैन्याने खारेपाटण काबीज केले.
या विजयाची माहीती सरदार जावजी गवळी यांनी १३ डिसेंबर १७५५ च्या पत्रात पेशव्यांना कळविली "पेशव्यांच्या सैन्याची किल्ल्याभोवती मोर्चे बसवून हल्ला सुरु असता चौथे दिवशी रुद्राजी धुळुप जमावसुध्दा फिरंगी व पनालाचे लोक व तेथील निवड करुन दीड हजार माणुस व आरमार महागिर्‍या ( जहाज ) व गलबते बावीस भरुन खारेपाटणच्या बंदराच्या नाक्यास प्रतःकाळ दोन घडी रात्री आले.तडीस उतरुन लष्करावर चाल केली.तो हशमी लोकांच्या चौक्या व कृष्णाजी महादेव टेकडीच्या माथ्यावर होते.त्याच्याने दम न धरवे.इतक्यात आम्ही व खंडेराव बरगे तयार होउन कुमकेस पोचलो.गनिमाने तो फारच शर्त केली.परंतु स्वामींच्या पुण्यप्रतापेकरुन लोकांना घोडी घालून उभयतांच्या करोलांनी ( बंदुकधारी ) मार दिल्हा.
    धुकट फार आले होते.येथे रुद्राजी धुलप व दुलबाजी माने मातबर माणुस यास व फिरंगियाचा सरदार इतक्यात गोळी जखमा झाल्या.पाच्,सात फिरंगी ठार जाले.लोकही जखमी फार जाले.आणकिही सरदार फार जावा जाले.फौजेची इभ्रत पाइच्यावरी भारी.यामुळे मोर्चे जसे होते त्याप्रमाणे कायमच होते.रुद्राजी याचा मोड जाला.सरोन गलबतात गेले.काही खुसकीने ( जमीनमार्गे ) निघोन झाडीतून पळाले.
   साहेबाच्या पुण्यप्रतापे असे जाले कि जेथे पुरुष दोन पुरुष पाणी होते तेथे ओहोटीने वाळु दिसु लागली.गलबतावर मिठी पडली.तेव्हा लोक पळाले.रुद्राजी धुलप व त्याचा मेव्हणा दुलबाजी मान्या व साठवलीच्या ठाणेदाराच्या लेक तिचे हस्तगत जाले.वरकड लोक झाडीत पळोन गेले.दोन गलबत व सात महागिर्‍या मागेच होती.ती मागच्या मागे पळून गेली.बारा गलबते व लहान एक,एकुन तेरा पडाव जाली.लहान थोर चाळीस पन्नास तोफा सापडल्या.गनीमास जरब फारच बसली."
 खंडेराव बर्गे खारेपाटण येथून १३ डिसेंबर १७५५ रोजी पेशव्यांना लिहीतात "रुद्राजी धुलप जमावसुध्दा आले.आरमारे,दारुगोळा, बाण संरजामसुध्दा आले.मोर्चे उठवावे ,लस्कर धुंडाउन घावे.हशम तो त्याच्या इभ्रतीने निघले.परंतु धन्याचे पुण्यप्रतापे रुद्राजी धुलप हस्तगत होउन राजश्री राजश्री तुलाजी आंगरे यांजवर इभ्रत बसली".
         तुळाजी आंग्रे कदाचित फिरुन खारेपाटण किल्ल्यावर आक्रमण करतील तेव्हा चांगला बंदोबस्त ठेवावा यासाठी ते पेशव्यांना लिहीतात."परंतु याचे सार्थक तेव्हाच कि फौज भारी आल्याने खावंदांची कार्यसिध्दी होईल.येथे जावजी बाबा गौली ( गवळी ) माकुल धन्याच्या कार्यास येकनिष्ट परंतु याचा उपाय काय ?याने काय करावे ? रात्रंदिवस धन्याच्या कार्यास मेहनतीस चुकत नाहीत.परंतु जमावाखेरीज काय करावे ? दिवसा बातमी राखावी असे आहे".
  सर्व काम पेशवे करण्यास समर्थ आहेत.पण सध्या येथील काम जावजीबाबा खेरीज होणार नाही हे पेशव्यांना सांगण्यास बर्वे विसरले नाहीत. ते लिहीतात "करणार धन्याचे पुण्य समर्थ,परंतु तरतुदेस जावजीबाबांखेरीज इतरास होणे नाही.येथील सविस्तर वर्तमान जावजीबाबांनी लिहीले आहे.गनीमाचा धीर सुटला आहे. गोवेकर सामील जाला,त्याचे पारिपत्य करावे.फौज सत्वर रवाना करावी.सर्वांनी जावजीबाबांच्या बुध्दीने चालल्याने साहेबकामे निसंशय होइल.यात अंतर नाही.घोडी बसावयास नाही.पुर्वी विनंती केली होती.आज्ञा करणार खविंद आहेत".
   आणि जावजी गवळी लिहीतात "फौज येत नाही तेव्हा जो आब धन्यानी दिल्हा आहे ते आबरु आमची रहाणार नाही.फौज मातबर आलियाशिवाय साहेब काम होत नाही."
खारेपाटण फत्ते केल्यावर जावजी गवळी याचे कौतुक करताना कृष्णराव भगवंत जावजीबाबांना ९ डिसेंबर १७५५ रोजी लिहीले "तुम्ही खंडोजी माणकर समागमे येउन गढी खारेपाटणास मोर्चेबंदी केली.गड हस्तगत करावी येवेसी बंदोबस्ती करणे ती केलीच होती.त्यास रुद्राजी धुळप सैन्य व आरमारसुध्दा येउन छापा घालावा हा मनोदय होता परंतु ईश्वर ईच्छेने गनिमास नामोहरम करुन रुद्राजी धुळूप यासी हस्तगत केले".
    खारेपाटण पेशव्यांच्या अंमलाखाली आला आणि विजयदुर्ग ताब्यात घेउन तुळाजींना कैदेत ठेवल्यामुळे आता आंग्रे यांच्या स्वारीची भिती नाहीशी झाली. पुढे खारपाटण हा विजयदुर्गच्या आनंदराव धु़ळूपांच्या ताब्यात असताना पंतआमात्यांनी   तो घेतला.त्यावर पेशव्यांनी त्यांना समज दिली.तेव्हा हैबतराव गायकवाड यांनी धुळुपांना सांगितले कि "आपण पंतआमात्यांनी खारेपाटणची गढी ती आमच्य्हा जिमा करुन देविली.आम्हाकडून आपलेकडील भले मनुष्य येतील त्यांच्याकडे ठाणे स्वाधीन करविले जाईल".
     परंतु खारेपाटण ताब्यात येत नाही पाहून धुळूपांनी स्वारी केली.यासंबधी २५ डिसेंबर १७९९ रोजीच्या पत्रात उल्लेख असा आला आहे "बावडेकर यासी धुलपाने लढाई देउन खारेपाटणची गढी घेतली आणि राजेपुरचे ठाणे येउन बावडेकर यास ( विशाळगड ) किल्ल्यापर्यंत पोहचविले".म्हणजे सन १७९९ मध्ये बावडेकरांनी खारेपाटण घेतला होता.तो नंतर विजयदुर्ग येथील पेशव्यांचे सरदार धुळूप यांनी बावडेकरांकडून खारेपाटण हस्तगत केला.
    शेवटचे बा़जीराव पेशवे यांनी ९ डिसेंबर १८११-१२ खारेपाटण कसबे येथे मुक्कामाला होते.दुसर्‍या दिवशी तिथून विजयदुर्गास रवाना झाले.११ डिसेंबर रोजी पुन्हा खारेपातणला आले होते.इंग्रजांनी सन १८१८ मध्ये खारेपाटण पेशव्यांकडून घेतला.सन १८१९ मध्ये इंग्रजांनी उल्लेख केला आहे कि "व्यापारासाठी अतिशय योग्य असे हे ठिकाण आहे".
  इतिहासाचा इतका पट पाहिलेला हा नदीकिनारी वसलेला भुईकोट बघायचा तर मुंबई - गोवा महामार्गावर सिंधुदुर्ग जिल्हा व रत्नागिरी जिल्ह्याच्या सीमेवर खारेपाटण गाव आहे. कोकण रेल्वेने गेल्यास राजापूर व नांदगाव या स्टेशनांपासून अंदाजे २५ कि.मी वर खारेपाटण आहे.मुंबई खारेपाटण हे अंतर ४०६ कि.मी. आहे तर राजापुर खारेपाटण हे अंतर २० कि.मी.आहे.
   मुंबई - गोवा महामार्गावरुन खारेपाटण गावात जाणार्‍या रस्त्याने सरळ गेल्यावर, प्रथम एसटीस्टॅड व पुढे बाजारपेठ लागते. बाजारपेठेतून खाडीकडे जाताना दुकानांच्या रांगामधुन पायर्‍यांची वाट खारेपाटण प्राथमिक शाळेकडे जाते. ही शाळा खारेपाटण किल्ल्यातच आहे.
       खारेपाटण ही चांगली बाजारपेठ आहे. बाजारपेठेतूनच किल्ल्याकडे रस्ता जातो. किल्ला म्हणून विचारल्यास अनेकांना तो माहित नाही. दुर्गामातेचे मंदिर म्हणून विचारल्यास लोक सांगू शकतात, हे मंदिर किल्ल्याच्या बालेकिल्ल्यात आहे. बाजारपेठेतूनच किल्ल्याकडे जाणाऱ्या तीन वाटा आहेत. किल्ल्यावरील दुर्गामाता मंदिराचे बांधकाम चालु असल्याने तेथवर सामानाची ने-आण करण्यासाठी कच्चा रस्ता बांधलेला असुन तो थेट किल्ल्याच्या वरील भागात जातो. दुसरी वाट बाजारपेठेतून खाडीकडे जाताना दुकानांच्या रांगामधुन पायऱ्यानी किल्ल्यात असलेल्या खारेपाटण प्राथमिक शाळेकडे जाते व तिसरी वाट बाजारपेठेच्या टोकाला असलेल्या नदीकाठच्या धक्क्याकडून पायऱ्यांनी वर चढते. हि वाट सर्वात सोयीची असुन या वाटेने संपुर्ण किल्ला पहाता येतो. 

 किल्ल्याच्या खालच्या भागातील उतारावर सध्या शासकिय विश्रामधाम आहे. या विश्रामधामधून किल्ल्यावर जाता येते हाच मार्ग सोयीचा आहे. येथपर्यंत गाडीमार्गही आहे. स्वत:चे वाहन नसल्यास महामार्गापासून अर्ध्यातासात चालत इथपर्यंत पोहोचतो येते.या किल्ल्याला पूर्वीच्या काळी एका बाजूने खाडीचे व जमिनीच्या बाजूने खंदकाचे संरक्षण होते. आज गावाची वाढ झाल्यामुळे खंदक नष्ट झाले आहेत. 

   शासकीय विश्रामधामाच्या पायर्‍या चढायला लागल्यावर डावीकडे लगेच फाटा फुटतो. या फाटय़ालाही काही पायर्‍या आहेत. येथुन पायऱ्या चढायला लागल्यावर सुरवातीलाच भिंतीलगत असलेले चुन्याच्या घाण्याचे चाक दिसते. ते पाहुन पायऱ्या चढुन डावीकडे वळल्यावर विश्रामधामच्या खालील बाजुस काही प्रमाणात शिल्लक असलेला एक बुरुज पहायला मिळतो. येथुन विश्रामधामच्या मागील बाजुने आपण एका घराच्या अंगणातून शाळेकडे येतो. त्या चढून आपण एका घराच्या अंगणातून पुढे चढून गेल्यावर एक शाळा लागते. येथे गावातून येणारा रस्ता मिळतो. 
इथुन समोरच बालेकिल्ल्याच्या तटबंदीचे अवशेष दिसतात. इथे असणारा किल्ल्याचा पुर्वाभिमुख दरवाजा पुर्णपणे उध्वस्त झालेला असुन केवळ पाच फुट उंचीची तटबंदी व फांजी शिल्लक राहिली आहे. छोट्याशा टेकडीवर वसलेल्या या किल्ल्याला उताराच्या बाजूने खाडीचे व जमिनीच्या बाजूने खंदकाचे संरक्षण होते. किल्ल्याचा आकार आयताकृती असुन किल्ल्याचे क्षेत्रफळ साधारण अडीच एकर आहे. किल्ल्याच्या तटबंदीत एकुण आठ बुरुज असुन चारही बाजुंना असलेली तटबंदी मातीच्या ढिगाऱ्यात गाडली गेली आहे. काही ठिकाणी हि तटबंदी ढासळली असली तरी या ढिगाऱ्यावरून संपुर्ण किल्ल्याला फेरी मारता येते. 

    या आयताक.ती माथ्याच्या चारही बाजुंना असलेल्या तटबंदीची अवस्था सध्या मातीच्या ढिगार्‍यात झालेली दिसते. किल्ल्याचे तीन कोपऱ्यावरील बुरुज कसेबसे उभे असुन आपण प्रवेश केलेला कोपऱ्यावरचा बुरुज नष्ट होण्याच्या मार्गावर आहे. किल्ल्याच्या तटावरून फेरी मारताना किल्ल्याच्या पुर्व व उत्तर बाजूस असलेला खंदक दिसतो तर पश्चिमेस खोल भाग असुन तेथे व दक्षिणेस वाघोटण खाडीचे सरंक्षण आहे. 
पुर्व बाजुच्या खंदकाबाहेर एक लहान व एक मोठा असे दोन समाधी चौथरे दिसतात. किल्ल्याच्या वरील भागात दुर्गामातेचे नव्याने बांधलेले मंदिर असुन या मंदिराच्या बांधकामासाठी तटबंदी फोडुन व खंदक बुजवुन आत रस्ता आणला आहे. येथे पुर्वी असणारे मंदिर शिवाजी महाराजांनी बांधल्याचे सांगण्यात येते. मंदिरात देवीचा तांदळा व नवीन मूर्ती आहे. मंदिराच्या बांधकामात येथे असलेले मूळ वास्तू अवशेष नष्ट झाले असुन मंदिरासमोरील झाडाखाली एक जुनी दीपमाळ दिसते. 
मंदिराच्या आसपास मोठया प्रमाणात उद्ध्वस्त वास्तूंचे चौथरे दिसुन येतात. या मंदिराजवळील विहिरीतून एक भूयार आहे व त्याचे दुसरे टोक खाडीवरील ‘‘घोडेपथार’’ या जागी झुडुपात लपलेले पाहायला मिळते.
याशिवाय किल्ल्यावर ‘सुळाचा दगड’ ,उध्वस्त वास्तूंचे चौथरे इ. गोष्टी पाहायला मिळतात.मंदिराच्या समोरील बाजुस असलेल्या बुरुजामध्ये एक लहान दरवाजा असुन या दरवाजातून बाहेरील खंदकात उतरता येते. 
दरवाजा लहान असला तरी तो वळणदार मार्गावर बांधलेला आहे. हा खंदक झाडी आणि गवताने भरलेला आहे. त्यामुळे या परिसरामधे जपूनच फिरावे लागते. खरेतर कोकणातील हे झाडीभरलेले किल्ले मार्च ते मे महिन्यात पाहिल्यास गवताचा फारसा त्रास जाणवत नाही. बालेकिल्ल्याच्या पश्चिम बाजूला मोठी घळ आहे. घळीच्या पलीकडे एका स्मारकाचा चौथरा पहायला मिळतो.


किल्ल्याच्या मध्यभागी एक ७० ते ८० फुट खोल भली मोठी पायऱ्यांची विहीर असुन असुन हि विहीर आपल्याला कोल्हापूर प्रांतातील किल्ल्यावरील विहिरींची आठवण करून देते. सध्या कोरड्या पडलेल्या ह्या विहिरीत मोठया प्रमाणात झाडी माजली असुन यातील पायऱ्यांनी विहिरीच्या आत उतरता येते. विहीर पाहुन बाहेर आल्यावर आपली गडफेरी पुर्ण होते. शासकीय विश्रामगृहामधून पाण्याची सोय केल्यास येथे मुक्काम करता येवू शकतो.

  मोठा इतिहास असताना खारेपाटणचा किल्ला इतिहास जमा होण्याच्या मार्गावर आहे. वेळीच दखल नाही घेतली तर किल्ला कालौघात नष्ट झाल्याशिवाय रहाणार नाही हे मात्र खरे.साधारण १८५० च्या सुमारास किल्ल्याचे तट व बुरुज पाडून त्याची दगड काढण्यात आले. ही घडवलेले दगड वापरुन नदीच्या काठावर एक धक्का बांधण्यात आल्याची नोंद आहे. हा धक्का उतारु लोकांना तीरावर उतरण्यासाठी बांधला होता. सध्या तो ही निरुपयोगी ठरलेला आहे.
  
 याशिवाय खारेपाटणमध्ये काळ भैरव मंदिर व कपिलेश्वर मंदिर आहे. यातील कपिलेश्वर मंदिरात असलेली प्राचीन सूर्यनारायण मुर्ती व विष्णुमुर्ती आवर्जुन पहावी अशी आहे. 

चंद्रप्रभू जैन मंदिर आणि नेमिनाथ जैन मंदिर , खारेपाटणमध्ये सुखनदीच्या किनारी स्थित ग्रामस्थचे श्रद्धास्थान असलेली अशी हि दोन मंदिरे आहेत . मुख्य रस्तापासून २-४ मिनिटांच्या अंतरावर हे मंदिर आहे .मंदिराकडे जाताना मुख्य प्रवेश कमानी आहे आणि तिथूनच मंदिराचा भाग सुरु होतो .गावातील लोक त्याला बस्ती असेही संबोधतात .



 



















 





















https://puputupu.blogspot.com/2010/12/8.html#.YEu7q5vhXIU







 















 

 

 

 

 


 

मनसर

 प्रकार : गिरीदुर्ग जिल्हा : नागपुर उंची : १२०० फुट ...