शिवचरित्र वाचत असताना किंवा, छत्रपती शिवाजी महाराजांचं चारित्र्य अभ्यास करताना. बऱ्याचदा आपल्याला कल्याण च्या सुभेदाराच्या सुनेच्या पात्रा विषयी वाचायला मिळतं अनेकदा अनेक भाषणांत ऐकाला देखील मिळतं. त्या पत्राविषयी शिवकालीन इतिहास अभ्यासकांमध्ये दोन गट पडलेले आपल्याला दिसतात.
एक जे हे पात्र(कल्याणचा सुभेदाराची सून) नाकारतात आणि दुसरे जे या पात्राचं पात्राचं म्हणण्यापेक्षा छत्रपती शिवाजी महाराजांनी जे धोरण स्वीकारलं त्या बद्दल जे धोरण स्वीकारलं त्या धोरणाचं समर्थन करतात.
सर्वात अगोदर हे प्रकरण नक्की काय आहे इतिहासात नेमकं कुठं सापडलं आणि कधी घडलं याचा अभ्यास करूयात. कल्याणच्या सुभेदारच्या सुनेच्या कथेची माहिती आपल्याला समकालीन नसली तरी ऐतिहासिक बखरींत सापडते. पहिली बखर आहे शककर्ते शिव छत्रपती महाराज आणि दुसरी बखर आहे शिवदिग्विजय.
आबाजी सोनदेव यांजकडे कल्याण प्रांताचा सुभा होता. त्या प्रांतामधील गडकोट यांच्या तटा बुरुजांच्या निगराणी ची जबाबदारी महाराजांनी त्यांजवर सोपविली. ज्या वेळी कल्याण प्रांत महाराजांनी घेतला त्यावेळी ‘मुलाणा हयाती’ नावाचा विजापूरकरांचा सुभेदार त्या प्रांतावर होता.
स्वराज्य वृद्धीसाठी कल्याणच्या सुभ्यावर मराठ्यांनी हल्ला करून अमाप संपत्ती हस्तगत केली. त्याकाळचे आक्रमक यवन स्वराज्याच्या लेकी बाळी बाटवण्यासाठी उचलून नेत असे. म्हणून की काय कोण जाणे कल्याणच्या सुभेदाराची सुंदर सून आबाजी पंतांनी उचलून आणली. व सुंदर “भेट” शिवरायांना उपहार म्हणुन पाठविली. या “उपहारावर” कडवी प्रतिक्रिया व्यक्त करीत शिवरायांनी आबाजीपंतांना खडे बोल सुनावले.
यापुढे असे कोणत्याही स्त्रीच्या बाबतीत असे वर्तन होता कामा नये असा सज्जड दम भरला. इतकेच नव्हे तर त्या सुभेदाराच्या सुनेची खणानारळाची ओटी भरून पालखीत बसवून मुघल छावणी मधे तिची सुखरूप रवानगी केली. या सुनेच्या विषयी शिवराय म्हणाले की जर आम्ही या सुंदर माऊलीच्या पोटी जन्मलो असतो तर आम्ही ही असेच सुंदर असतो.
ही ढोबळ कथा कमी अधिक फरकाने दोन्ही बखरीमध्ये उपलब्ध आहे. बखर ऐतिहासिक असल्यातरी त्या समकालीन नक्की नव्हत्या. कारण पहिली बखर आहे ‘शककर्ते श्री शिव छत्रपती महाराज’ जी लिहिली मल्हार रामराव चिटणीस यांनी, १८१० साली सातारा छत्रपती दुसरे शाहू उर्फ प्रतापराव ह्यांच्या आज्ञेवरून त्यावेळच्या गादीचे चिटणीस मल्हार रामराव यांनी हि बखर लिहिली.
बाळाजी आवजी चित्रे यांच्या नातवाने ही बखर ऐकीव माहिती नुसार आणि वडिलोपार्जित जी कागदपत्रे त्यांच्या संग्रही होती त्या नुसार ही बखर लिहिली.
दुसरा उल्लेख आढळतो ती बखर आहे शिवदिग्विजय. ही बखर कोणी लिहिली याचा उल्लेख कुठे आढळत नाही, परंतु बडोद्याच्या पांडुरंग रामचंद्र नंदुरबारकर व लक्ष्मण काशिनाथ दांडेकर यांनी १८९५ साली हा दस्त प्रकाशित केला. हि बखर प्रकाशित झाली तेव्हा छत्रपती शिवाजी महाराजांचे निर्वाण झाल्यावर लगेचच लिहिली असं प्रकाशकांच मत होतं.
समकालीन एकही पुरावा नसल्याने ही एक दंतकथा आहे असं म्हणायला वाव आहे. परंतु शिवकालीन इतिहासाचा अभ्यासपूर्ण लेखन करणारे वा सि बेंद्रे यांनी अश्याच आशयाची कथा सांगितली आहे.
वाई जवळच्या गोळेवाडी च्या सुभेदाराची सून भेट म्हणून महाराजांच्या समोर पेश केली त्यावर महाराजांनी ब्राम्हण सरदाराला (पुस्तकात तसा उल्लेख आहे जर कोणाच्या भावना दुखावल्या असतील तर शुद्ध अंतःकरणाने माफी मागतो) शिवाजी महाराजांनी तिखट प्रतिक्रिया देऊन काशीस जाण्यास सुनावले. ही १९७२ साली कथा छत्रपती शिवाजी महाराज यांचे चिकित्सक चरित्र खंड एक पान क्रमांक ११४ वर उपलब्ध आहे.
जर ही घटना आहे अशी समजली तर कल्याणच्या छाप्या दरम्यान कल्याणच्या सुभेदाराची सून कदाचित घाबरून पेटाऱ्यात लपली असू शकते. तो पेटारा तसाच मराठयांनी आणला आणि हा प्रसंग घडला असू शकतो असा तर्क आपण लावू शकतो. पण आबाजी सोनदेव हे प्रतिष्ठित आणि विश्वासू सेवक असल्याने ते असं जाणीवपूर्वक करतील असं वाटतच नाही.
इतिहासात जर तर आणि तर्काना काही अर्थ निश्चितच नसतो. परंतु हा प्रश्न असा पडतो कि ज्या गौरवशाली इतिहासाचे दाखले देऊन आपण नवीन पिढी घडवण्याचे स्वप्न पाहतो निदान त्या इतिहासाने तरी आमच्या काय किंवा शत्रूंच्या लेकीबाळीवर न्याय केला आहे का नाही?
‘परस्त्री ही मातेसमान’ मानणाऱ्या आमच्या छत्रपती शिवाजी महाराजांचा उदात्त विचार किती गंगे समान निर्मळ आहे याचा एक ऐतिहासिक पुरावा म्हणून ‘कल्याणच्या सुभेदाराची सून’ ह्या प्रकरणाकडे आपण नक्की बघू शकतो. छत्रपती शिवाजी महाराजांचे ‘परस्त्री विषयी असलेले आदरयुक्त धोरण’ एवढाच शुद्ध हेतू ला लेख लिहिण्या मागे आहे.
किल्ले दुर्गाडी
- प्रमोद मांडे
कल्याण शहर उल्हास नदी, खाडी किनारी वसलेले आहे. सातवाहनांच्या राजवटीमध्ये कल्याण बंद खूप प्रसिद्ध होते. मध्यपूर्व देशातील तसेच रोम पर्यंत चालणार्या व्यापाराचे कल्याण हे केंद्र होते. कल्याण बंदरामध्ये येणारा व्यापारी माल येथून नाणेघाटमार्गे जुन्नर तसेच प्रतिष्ठाण (पैठण) या राजधानीकडे रवाना होत असे.
बोर घाटाजवळ उगम पावणारी उल्हास नदी वसईजवळ समुद्राला मिळते. उल्हास नदीला कसारा घाटाजवळ उगम पावणारी भातसाई नदी तसेच माळशेज घाटाकडून वाहत येणारी काळ नदी येवून मिळते. त्यामुळे खाडीला पाणी भरपूर असते.
हा भाग निजामशाही (अहमदनगर) च्या अस्तानंतर आदिलशाही (विजापूर)च्या ताब्यात आला. इ.स. १६३६ नंतर आदिलशाहीच्या ताब्यात असलेल्या या प्रदेशाचा ताबा छत्रपती शिवाजी महाराजांनी इ.स. १६५४मध्ये घेतला. त्यावेळी कल्याण बरोबर भिवंडीही ताब्यात आणली.
कल्याण सारखे महत्त्वाचे बंद ताब्यात आल्याबरोबर छत्रपती शिवाजी महाराजांनी येथे किल्ला बांधण्याचा आदेश दिला. आबाजी महादेवाने येथे किल्ला बांधण्यासाठी पाया खंदत असताना या पायामध्ये अमाप द्रव्य सापडले. दुर्ग बांधत असतानाच द्रव्य मिळाही ही दुर्गेचीच कृपादृष्टी समजून किल्ल्याचे नाव दुर्गाडी ठेवण्यात आले.
दुर्गाडी किल्ल्याच्या आश्रयानेच शिवाजी महाराजांनी आपले आरमार उभारण्यासाठी येथे गोदी निर्माण केली. येथे निर्माण झालेल्या आरमाराने पुढे मुंबईच्या इंग्रजांना, वसईच्या पोर्तुगिजांना तसेच जंजिर्याच्या सिद्धीला दहशत बसविली. छत्रपती शिवाजी महाराजांनी कल्याणच्या दुर्गाडी किल्ल्याच्या आश्रयाने भारतीय आरमाराचा पाया घातला.
कल्याणच्या बसस्थानकापासून रिक्षाने १५ मिनिटात दुर्गाडी किल्ल्याजवळ पोहोचता येते. किल्ल्याच्या प्रवेशमार्गावर सध्या कमान उभारलेली आहे. या मार्गावर पूर्वी दरवाजा होता, याला गणेश दरवाजा म्हणून ओळखले जाता असे. येथे गणेशाची मूर्ती आहे.
दुर्गाडीच्या लहानशा किल्ल्यावर दुर्गामातेचे मंदिर आहे. त्यामुळे येथे भक्तांचा नेहमीच राबता असतो. मंदिरात पूर्वीचा देवीचा तांदळा असून नव्याने बसविलेली मूर्तीही आहे.
मंदिराजवळ इदग्याची भिंत आहे. गडाच्या खाडीकडील भागाकडे तटबंदी व बुरुजाचे अवशेष आहेत. गडावरील अवशेष मात्र काळाच्या ओघात लुप्त झाले आहेत. दुर्गाडीचा किल्ला लहान असल्यामुळे सर्व परिसर पाहण्यासाठी अर्धा पाऊण तास पुरेसा आहे.

दुर्गाडी किल्ला
इसवी सन पूर्वीच्या दुसऱ्या-तिसऱ्या शतकापासून जगाच्या नकाशावर कल्याण हे बंदर आणि भरभराटीला आलेले व्यापार केंद्र म्हणून प्रसिद्ध होते. उल्हास नदीच्या तीरावरील जहाज नांगरणीस सुयोग्य नैसर्गिक धक्का, माळशेज घाट, भोर घाट या घाट रस्त्यामार्फत उत्तर आणि दक्षिण भारताशी सोयीची जोडणी, मध्यपूर्व आणि पाश्चिमात्य देशांशी जलमार्ग वाहतुकीस सुनियोजित बंदर अशा अनेक भौगोलिक कारणांमुळे कल्याण एक प्रमुख राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय बाजारपेठ म्हणून उदयास आलेले होते. यामुळेच ह्यएन त्संग हा चिनी प्रवाशाने कल्याणाचा उल्लेख महाराष्ट्राची राजधानी म्हणून केला आहे.
सन १६५७ मध्ये मध्ये शिवाजी महाराजांनी उत्तर कोकण मोहीम काढली. म्हणजे त्याकाळी आदिलशहाचा अंमळ असलेल्या कल्याण भिवंडी हे प्रदेश स्वराज्यास जोडण्याचे ठरवले. आदिलशहाने आपली उत्तर कोंकणातील संपत्ती गुप्तपणे पुरंदर आणि तेथून विजापूरला नेण्याचे ठरवले होते. परंतु खजिना हलविण्याचा आधीच मोहिमेच्या अंतर्गत दादाजी बापुजी रांझेकर यांनी २४ ऑक्टोबर १६५७ या दिवशी कल्याण ताब्यात घेतले. संपूर्ण खजिना, बंदरातील उभी असलेली देशी विदेशी जहाजे महाराजांच्या ताब्यात आली. कल्याण ताब्यात घेतल्या नंतर महाराज स्वतः कल्याणमध्ये दाखल झाले. कल्याण खाडी किनारी असलेला दुर्गाडी किल्ला तेव्हा एक टेहळणी चौकी होती. दुर्गाडी किल्ल्याचे स्थान आणि त्याची उपयुक्तता लक्षात घेऊन त्याची डागडुजी करून किल्ल्यावर दुर्गामातेचे मंदिर उभारून व आई जगदंबेचे नाव किल्ल्याला देऊन उत्तर कोंकणातील प्रवेश द्वारच बनविले. किल्ल्याचे खाडीकिनारी स्थान, बंदराचे आणि व्यापारमार्गाचे महत्व, नौकाबांधणीचा उद्योग या सर्व गोष्टी लक्षात घेऊन महाराजांनी कल्याण बंदरातून हिंदवी स्वराज्याचे पहिले आरमार उभारण्याचे ठरविले. अर्वाचीन इतिहासामध्ये समुद्राचे आणि आरमाराचे महत्व जाणणारे शिवाजी हे पहिले राजे होते. राजांच्या या दूरदृष्टी धोरणामुळे कल्याणच्या व स्वराजाच्या सोनेरी इतिहासामधील हा वारसा आपल्याला प्राप्त झाला
http://www.behistorical.com/durgadi-fort-information-kalyan-mumbai/
“ज्याचे गडकोट त्याचे स्वराज्य आणि ज्याचे आरमार त्याचा समुद्र. . .” हे तंत्र छत्रपती शिवाजी महाराजांनी वेळीच पक्के ओळखले होते. इंग्रज, सिद्दी, डच, पोर्तुगीज ह्या परकीय शत्रूंपासून स्वराज्याला निर्धोक ठेवायचे असेल तर हिंदवी स्वराज्यासाठी स्वतंत्र आरमाराची बांधणी करणे हि काळाची गरज होती.
कल्याण शहर म्हणजे शिवपूर्व काळापासून एक प्रमुख बंदर म्हणून प्रसिद्ध होते. शहराच्या संरक्षणार्थ चहुबाजूने तटबंदी, एकूण ११ बुरुज आणि अनेक लहान-मोठे दरवाजे बांधले होते. सन १६५४ साली शिवाजी महाराजांनी भिवंडी, कल्याण हि प्रमुख ठाणी जिंकून घेतली. कल्याण मधून वाहणारी उल्हास नदी थोडे अंतर पुढे जाऊन समुद्राला मिळते. ह्या उल्हास नदीच्या खाडीवर एका छोट्याशा टेकडीवर शिवाजी महाराजांनी किल्ल्याची स्थापना करून हिंदवी स्वराज्याच्या आरमाराची मुहूर्तमेढ रोवली. किल्ल्याचे बांधकाम चालू असताना पाया खोदताना अमाप संपत्ती सापडली. हि सर्व दुर्गा देवीची कृपा म्हणून किल्ल्यास दुर्गाडी नाव दिले गेले. किल्ल्यामध्ये आरमाराची गोदी बांधून लढाऊ जहाजबांधणीचा कारखाना सुरु झाला. दुर्गाडी किल्ल्यामध्ये एकूण ३४० पोर्तुगीज कारागीर जहाज बांधणीच्या कामी असल्याची नोंद इतिहासात सापडते.
दुर्गाडी किल्ल्यास भेट देण्यासाठी मुंबई शहरापासून केवळ ४० किमी अंतरावर असलेले कल्याण शहर गाठावे. शहराच्या मध्यभागीच दुर्गाडी किल्ला वसलेला आहे. किल्ल्याच्या मध्यभागी दुर्गादेवीचे सुंदर मंदिर आहे. नव्याने उभारलेल्या कमानीतून प्रवेश करताच समोर एक छोटीशी गणपतीची मूर्ती दिसते. म्हणून ह्या प्रवेशद्वाराला गणेश दरवाजा असेही म्हणतात. थोडी तटबंदी आणि बुरुजांचे बांधकाम पार करून देवीच्या मंदिराकडे जाता येते. उल्हास नदीकडील भागाकडे देखील किल्ल्याची थोडीशी तटबंदी आणि दोन बुरुजांचे बांधकाम दिसते.
छत्रपती शिवाजी महाराजांच्या मृत्युंनतर १६८२ साली दुर्गाडी किल्ला मोघलांच्या ताब्यात गेला. हसन अली खान ह्या मोघल सरदाराने कल्याण प्रांत मोघलांना जिंकून दिला मात्र संभाजी महाराजांनी अल्पावधीतच हल्ला करून कल्याण प्रांत परत स्वराज्यात समाविष्ट केला.
संभाजी महाराजांच्या मृत्युंनतर १६८९ मध्ये कल्याण प्रांत परत मोघलांच्या ताब्यात गेला आणि सतराव्या शतकाच्या सुरुवातीस पेशवाईमध्ये शामिल झाला. पेशवाईच्या काळात कल्याणचे सुभेदार रामजी बिवलकर यांनी किल्ल्यातील दुर्गादेवीच्या मंदिराचा जीर्णोद्धार केला. १७२८ साली पोर्तुगीजांनी दुर्गाडी घेण्यासाठी किल्ल्यावर हल्ला केला मात्र किल्लेदार शंकरजी केशव आणि त्यांच्या साथीदारांनी हा हल्ला परतवून लावला.
आजमितीस किल्ल्याची आधुनिक पद्धतीने डागडुजी झाली आहे. किल्ल्यामध्ये असलेल्या
दुगादेवीच्या दर्शनासाठी बरेच भाविक येत असतात. त्यामुळे आधुनिक पद्धतीने बांधलेले देवीचे मंदिर, रंगकाम केलेले किल्ल्याचे बुरुज-तटबंदी, किल्ल्याच्या अंतर्गत भागात बांधलेला सिमेंट-फरशी चा पादचारी मार्ग, बसण्यासाठी असलेले लोखण्डी बाक तसेच किल्ल्याच्या बाहेरील बाजूस असलेली हार-फुलांची दुकाने ह्या सर्वांमुळे किल्ल्याला एका देवस्थानाचे स्वरूप आल्यासारखे वाटते. देवीच्या दर्शनासाठी भाविकांनी तर अवश्य यावेच मात्र त्या सोबत दुर्गाडी किल्ल्याचे इतिहास महत्व देखील लक्षात घेणे गरजेचे आहे. दुर्गादेवीच्या मंदिरासोबतच आपण अशा एका ऐतिहासिक स्मारकास भेट देतआहोत कि ज्याच्या सहाय्याने छत्रपती शिवाजी महाराजांनी सर्व परकीय सागरी शत्रूंना पुरून उरेल असे बलाढ्य आरमार उभारले होते याची आठवण देखील मनात असायला हवी.
दुर्गाडी.
ठाणे जिल्ह्यातील कल्याण शहराला ऐतिहासिक वारसा लाभलेला आहे. या शहरातील दुर्गाडी किल्ल्यावर शिवाजीमहाराजांनी मराठा साम्राज्यातील पहिल्या आरमाराची मुहूर्तमेढ रोवली होती. बोरघाटात उगम पावणारी उल्हास नदी वसईजवळ समुद्राला मिळते. उल्हास नदीला कसारा घाटाजवळ उगम पावणारी भातसाई नदी तसेच माळशेज घाटातुन वाहत येणारी काळ नदी या उपनदया येऊन मिळतात. या खाडीला भरपुर पाणी असल्याने पुर्वीच्या काळी या खाडीतुन मोठी गलबते सहजरीत्या ये-जा करत असत. याच उल्हास खाडीकिनारी कल्याण बंदर व शहर वसलेले आहे. कल्याण स्थानकात उतरुन बसने अथवा खाजगी वाहनाने १५ मिनीटात दुर्गाडी किल्ल्यावर जाता येते.
खाडीकडून कल्याण शहरात शिरताना शहराच्या प्रवेशद्वारावरच शिवकालीन इतिहासाचा साक्षीदार असलेला दुर्गाडी किल्ला खाडी किनारी लहानशा टेकडीवर उभा आहे. किल्ल्याकडे जाताना अलीकडील चौकात असणारा छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा आपले लक्ष वेधुन घेतो. किल्ल्याच्या प्रवेशमार्गावर सध्या कमान उभारलेली आहे. गडाचे प्रवेशद्वार नष्ट झालेले असुन त्याला लागुन असलेले बुरुज मात्र शिल्लक आहेत. या बुरुजात गणेशाची लहानशी संगमरवरी मुर्ती असुन हा दरवाजा गणेश दरवाजा म्हणुन ओळखला जातो. गणेश दरवाजाच्या डाव्या बाजुने जाणारी वाट टेहळणी बुरुजाकडे जाते तर उजव्या बाजूची वाट वर दुर्गादेवी मंदिरात जाते. टेहळणी बुरुजाकडून गडाच्या मागील भागात जाता येते पण तेथे जाण्यास मनाई आहे.
दुर्गादेवीचे मंदिर लहानसे असुन त्याचा जिर्णोध्दार पेशवे काळात कल्याणचे सुभेदार रामजी महादेव बिवलकर यांनी केला. मंदिरात देवीची ३ फुट उंचीची नवीन मुर्ती असुन देवीचा जुना तांदळा त्याच मूर्तीच्या बाजूला ठेवण्यात आला आहे. मंदिराचा गाभारा छोटासा असुन कळस गोल घुमटाकार आहे. मंदिराच्या मागील बाजुस इदगाह असुन तेथे जाण्यास मागील बाजुने पायऱ्या आहेत पण सध्या येथे जाण्यास मनाई आहे. याखेरीज खाडीच्या बाजुला दोन मोठे भग्न बुरुज व थोडे तटबंदीचे अवशेष आहेत. गडावरील इतर अवशेष काळाच्या ओघात लुप्त झालेले असुन गडसंवर्धनासाठी केलेला केविलवाणा प्रयत्न पहायला मिळतो. गडाला रस्त्याच्या बाजुने फेरी मारली असता तटबंदीत असणारे जुने घडीव दगड व त्यावर नव्याने केलेले बांधकाम तसेच जुन्या खाडीपुलावरून किल्ल्याची खाडीकडील बाजु पाहता येते. दुर्गाडी किल्ला व परिसर पाहण्यासाठी अर्धा तास पुरेसा आहे.
सातवाहन काळात कल्याण बंदर म्हणुन प्रसिद्ध होते. मध्यपुर्व आशिया खंडात रोमपर्यंत चालणाऱ्या व्यापाराचे कल्याण हे केंद्र होते. कल्याण बंदरात येणारे सामान तेथुन नाणेघाटमार्गे जुन्नर तसेच पैठणकडे रवाना होत असे. अहमदनगरच्या निजामशाही अस्तानंतर हा भाग विजापूरच्या आदिलशाहच्या ताब्यात आला. आदिलशाहीच्या ताब्यात असलेल्या या प्रदेशाचा ताबा २४ ऑक्टोबर इ.स.१६५७ मध्ये दिवाळी वसुबारसच्या दिवशी छत्रपती शिवाजी महाराजांनी घेतला. यावेळी कल्याण शहराला संरक्षणासाठी भक्कम तटबंदी, ११ बुरुज व अनेक दरवाजे होते. ज्याचा गड त्याची जमीन’ आणि ज्याचे प्रबळ आरमार त्याचा समुद्र हा मंत्र महाराजांनी जाणला होता. कल्याणसारखे महत्त्वाचे बंदर ताब्यात आल्याबरोबर जमिनीप्रमाणे समुद्रमार्गेही शत्रु आपल्यावर चाल करुन येऊ शकतो या जाणिवेतुन शिवाजी महाराजांनी आबाजी महादेवांना कल्याणच्या भुईकोटा शेजारी खाडीकिनारी किल्ला बांधण्याचा आदेश दिला. येथे किल्ला बांधण्यासाठी पाया खणत असताना अमाप द्रव्य सापडले. दुर्ग बांधत असतानाच द्रव्य मिळाले ही दुर्गादेवीची कृपा समजून किल्ल्याचे नाव दुर्गाडी ठेवण्यात आले. या दुर्गाडी किल्ल्याच्या आश्रयाने मराठ्यांच्या आरमाराची मुहूर्तमेढ रोवली. किल्ल्याबरोबर शिवरायांनी आरमारी गोदी बांधून लढाऊ जहाजांची निर्मिती सुरु केली. या कामाकरीता दुप्पट मोबदला देऊन पोर्तुगीजांचे सहाय्य घेण्यात आले.
गलबते बांधण्यासाठी ३४० पोर्तुगिज कारागीर येथे काम करत होते. पोर्तुगीज दुर्गाडीस गोद्रेलस म्हणत. महाराजांच्या या आरमाराची दखल फ्रेंच आरमाराने घेतली व डोंगरातील राजा आता समुद्रात उतरतोय तेव्हा तुमचे बस्तान कुठे ठेवायचे ते तुम्हीच ठरवा अशा आशयाचे पत्र वसईतील पोर्तुगीजांना लिहिले. त्यामुळे येथील कारागीर एका रात्री काम अर्धवट टाकुन पळुन गेले व उर्वरीत काम स्थानिक कारागिरांनी पुर्ण केले. या आरमाराने पुढे मुंबईच्या इंग्रजांना , वसईच्या पोर्तुगिजांना तसेच जंजिऱ्याच्या सिद्धीलाही दहशत बसविली. इ.स. १६८२साली मोगल सरदार हसनअली खान याने कल्याण जिंकले पण संभाजीराजांनी हल्ला करुन कल्याण परत ताब्यात घेतले. नंतर १६८९ मध्ये मोगलांनी परत कल्याण जिंकले. इ.स १७२८ मध्ये पोर्तुगिजांनी दुर्गाडी किल्ल्यावर हल्ला केला पण पेशव्यांचे किल्लेदार शंकरजी केशव,गंगाजी नाईक व त्याच्या साथीदारांनी हा हल्ला यशस्वीपणे परतवुन लावला. मराठा आरमाराचा मुहुर्त करणारा अनेक लढायांचा व रोमहर्षक घटनांचा साक्षीदार असणारा हा किल्ला एकदा तरी पहायला हवा.
माहिती साभार
सुरेश किसन निंबाळकर
दुर्गाडी किल्ला, आरमार व इतिहासाच्या पाऊलखुणा
२४ ऑक्टोबर १६५७ रोजी कल्याण जिंकल्यानंतर महाराजांनी कल्याण बंदरातून हिंदवी स्वराज्याचे पहिले आरमार उभारण्याचे ठरविले.
महाराजांकडे समुद्राचा अनुभव जवळपास नव्हता तरीही द्रष्टया राजांनी आरमाराच्या उभारणीचा निर्णय घेतला. या निर्णयामागची दूरदृष्टी समजण्यासाठी काळाची काही पाने उलगडणे आवश्यक ठरते.

ठाणे-उल्हास खाडी हा प्राचीन जलमार्ग म्हणजे समृद्ध व्यापारी मार्ग. याच मार्गावर अंतरा-अंतरावर खाडीकिनारी ठाणे, कल्याण, भिवंडी, चेंदणी, महागिरी, कोलशेत, नागला, गायमुख, घोडबंदर इत्यादी बंदरे व्यापारी बंदर म्हणून उदयास आली होती. अरब व्यापाऱ्यासमवेत या मार्गाद्वारे होणाऱ्या व्यापारामुळे हि बंदरे व तसेच तेथील राज्यकर्ते आर्थिकदृष्ट्या संपन्न झाले होते.
इ.स. 1498 साली वास्को द गामा आफ्रिकेच्या दक्षिण टोकाच्या केप ऑफ गुड होपला वळसा घालून भारताच्या पश्चिम किनाऱ्यावर पोहोचला आणि येथूनच पोर्तुगीजांच्या आरमारी वर्चस्वाची आणि अरबांच्या ऱ्हासाला सुरुवात झाली. व्यापाराच्या निमित्ताने आलेल्या दर्यावर्दी पोर्तुगीजांनि खाडीकिनारी वखारी स्थापन केल्या. संपूर्ण अरब व्यापाऱ्यांना संपविण्याचे पोर्तुगीजांचे धोरण होते, त्या दृष्टीने वखारीच्या आडोशाने खाडीकिनारी जागोजागी लहानसहान चौकीवजा कोटकिल्ले बांधण्यात आले. ठाणे, हिराकोट, पारसिक, पिंपळास कोट, कांबे किल्ला, खारबावची गढी, नागला कोट, गायमुख गढी, मालजगढी, घोडबंदर किल्ला, धारावी किल्ला आणि वसई किल्ला असे किल्ले यातूनच उभे राहिले.
सन १५३३-३४ मध्ये हुमायून बादशहाने गुजरातवर चाल केली तेव्हा घाबरून गुजरातच्या शहाने पोर्तुगीजांची मदत घेतली आणि त्या बदल्यात मुंबईच्या सात बेटांसह ठाणे, वसई प्रांत-पोर्तुगीजांना बहाल केला. पुढे पोर्तुगीजांनी त्यांच्या हद्दीतून जाणाऱ्या जहाजांवर जबर कर बसविला. त्यामुळेच प्राचीन काळापासून देशोदेशी चालत आलेला अरब व्यापाऱ्यांचा व्यापार-उदीम बंद पडला.
शिवाजी महाराजांचा जन्म पुढे १०० वर्षांनी म्हणजे १६३० साली झाला परंतु महारांजांनी पोर्तुगीज लोकांचा अंतस्थ धूर्त हेतू दूरदर्शीपणे लवकरच हेरला. सन 1656 साली महाराजांनी चंद्ररावाचा पराभव करून जावळी खोरे ताब्यात घेतले. आणि या खोऱ्यालगत कोकणात महाराजांचा प्रवेश झाला. साहजिकच परकीय आरमारी सत्तांशी संघर्षाची सुरुवात झाली.
या पार्श्वभूमीवरच जेव्हा सन १६५७ साली शिवाजी महाराजांनी कल्याण जिंकले, लगेचच वसुबारसेच्या मुहूर्तावर महाराजांनी आरमारी जहाजांचा कारखाना सुरू केला. या गोदीतून तरांडी, तारवे, शिबाडे, गुराबा, पगारा, तीरकाठी, मचवा, पाल, संगमिऱ्या आणि फत्तेमाऱ्या अशा निरनिराळ्या आकाराची लढाऊ जहाजे तयार होऊ लागली. हि आरमारी जहाजे ठाणे खाडीतूनच दाभोळ, रत्नागिरी, राजापूर आणि कारवारपर्यंत जात-येत होती. शिवकालात मराठयांचे आरमार लहान नौकांचे व वेगवान होते. हि आरमारी जहाजे अरुंद व नालेचा भाग लांबलचक निमुळता असल्यामुळे पाणी सहजपणे कापीत चपलतेने पुढे जात. आरमार उभारताना कान्होजी आंग्रे, मायनाक भंडारी, दौलत खान असे हिरे उभरून चकाकत बाहेर आले.
महाराजांच्या अल्पावधीत केलेल्या प्रगतीची साक्ष ठाणे-वसईच्या गव्हर्नरांनी आरमार स्थापनेच्या दोनच वर्षांनी लिहिलेले पत्र देते. १६ ऑगस्ट १६५९ रोजी फ्रॅन्सिस्को-द-मेलो-ए-कस्ट्रो आणि अँटोनिया-डी-सोझा कुतिन्हो आपल्या राजाला लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे की, 'आदिलशहाचा सरदार शहाजी याच्या मुलाने वसई, चौलजवळचा प्रदेश जिंकला असून कल्याण, भिवंडी, पनवेल येथे आरमार व सैन्य सजविले आहे. म्हणून आम्ही आमच्या कप्तानांना हुकूम देऊन ठेवला आहे की त्यांच्या गलबतांना अटकाव करा.'
महाराजांच्या वाटचालीचे दुसरी साक्ष म्हणजे सुरुवातीला स्वराज्य आरमार सामर्थ्याला खिजगणितही न धरणारे इंग्रज राज्यकर्ते यांचे पत्र . १ नोव्हेंबर १६७९ रोजी इंग्रज कप्तान मुंबईच्या गव्हर्नरला लिहितो, 'शत्रूची (शिवाजी महाराजांची) गॅलव्हेटस आमच्या समोरून सहज निघून जातात. आमच्या शक्ती त्यांच्यापुढे चालत नाही, कारण या लहानशा होड्या आम्हाला सहज व आश्चर्यकारकपणे चकवतात. आता आम्हाला असे वाटू लागले आहे की,आमच्याकडे तसल्या होड्या असतील तर आम्हालाही मदत होऊ शकेल'
छत्रपती शिवाजी महाराजांनी खाडीकिनारी दुर्गाडी किल्ला बांधून स्वराज्याच्या आरमाराची मुहूर्तमेढ रोवली. महाराजांच्या दूरदृष्टीने साकारलेल्या स्वराज्याच्या आरमाराने शिवोत्तर कालात पश्चिम सागरात प्रबळ सत्ता निर्माण केली. एक काळ पोर्तुगीजांचा परवानगीशिवाय भारतीय उपखंडाच्या सागरात संचार करणे अवघड होते. परंतु कालांतराने समुद्रसंचारासाठी स्वराज्याच्या मराठा आरमाराची परवानगी काढणे आवश्यक ठरू लागले. 'ज्या जवळ आरमार त्याचा समुद्र.' हे महाराजांचे स्वप्न सत्यात उतरले होते.
सुवर्ण इतिहासाच्या या पाऊलखुणा आजही आपल्या कल्याणमध्ये व आजूबाजूला आहेत. दुर्गाडी किल्ल्याशेजारी तसेच याच खाडीवर पुढे अजून अनेक गावात आजही नौकाबांधणी सुरु आहे. दुर्गाडी किल्ल्याच्या पश्चिमेला आजच्या सात पूलच्या बाजूला पिंपळास गडाचे अवशेष आजही इतिहासाची साक्ष देत आहेत
दुर्गामाता मंदिर
हजारो वर्षांच्या इतिहासाचा अखंड प्रवाह लाभलेले आपले कल्याण अनेक सुवर्णांकित घटना आणि वास्तूंचा वारसा जतन करून आहे.
दुर्गाडी किल्ल्यावरील दुर्गामातेचे मंदिर हे या इतिहासातील सोनेरी पान. दुर्गामातेच्या मंदिराचा सर्व कल्याणकरांच्या हृदयात एक विशिष्ठ स्थान आहे.
दुर्गाडी किल्ल्याच्या इतिहासाची काही माहिती आपण मागील पोस्टमध्ये घेतली. (लिंक कंमेंट मध्ये). सुभेदाराची सुन घटना, छत्रपतींचा कल्याण चरणस्पर्श, अशीच आमुची आई असती सुंदर, रूपवती, आम्हीं ही सुंदर झालो असतो वदन, स्त्रीशक्तीच्या उपासनेसाठी छत्रपती शिवाजी महाराजांनी बांधलेले भवानी मातेचे मंदिर, दुर्गाडी किल्ल्यावरून भवानी मातेच्या आशीर्वादाने पहिल्या हिंदवी आरमाराची स्थापना या सर्व घटना कल्याणच्या इतिहासाची पूर्व आणि पश्चात विभागणी करतात. पुढे १७३९ मध्ये मराठ्यांनी वसईचा किल्ला सर केला. या युद्धात पराक्रम गाजविलेल्या शंकराजी फडकेंना वसईचा सुभेदार नेमण्यात आले. या इतिहासकाळात वसई, कल्याण आणि साष्टी यांची विशिष्ठ नोंद आहे. १७४४ मध्ये दुर्गादेवीच्या मंदिराचा जीर्णोद्धार करून नवे मंदिर बांधल्याची नोंद पेशवे दफ्तरात सापडते. तसेच त्याठिकाणी वेदमूर्ती महादेवभट गोडबोले यांची श्री दुर्गाभवानी किल्ले दुर्गाडी, कोट कल्याण येथे पूजाअर्चा करण्यासाठी नेमणूक केली. तेव्हापासून आजपर्यंत तेथे नवरात्र उत्सव उत्साहाने साजरा होत आलेला आहे.
वाड्यांच्या या समृद्ध शहराचा इतिहास आपल्याला शिवरायांच्याही भूतकाळात घेऊन जातो. शिवरायांनी या शहराचे भौगोलिक महत्त्व ओळखून याला मराठा साम्र्याज्यातील एक बंदर म्हणून नावारूपास आणलं होतं.दुर्गाडी किल्ला आणि काळा तलाव अजूनही या समृद्ध इतिहासाची साक्ष देत उभे आहेत. या दुर्गाडी किल्ल्यावरची दुर्गा देवी ही कल्याणची आराध्य देवता. आणि अजून एक वैशिष्ठ्य सांगायचं म्हणलं तर प्रत्येक शहर किंवा गावामध्ये आता दुरापास्त झालेलं एका काळातील प्रसिद्ध वाहतुकीचं साधन म्हणजे घोडागाडी किंवा टांगा हे आजही कल्याणाच्या रस्त्यावर त्यांचा थाट कायम ठेवून आहे.

दुर्गा देवीच्या स्थापनेपासूनच्या काळातून थोडंसं पुढे आलं की आपण येतो ‘ वाडे संस्कृती’त. सुभेदार वाडा, वैद्य वाडा, जोग वाडा अश्या अनेक वाड्यांनी या शहराच्या संस्कृतीचा पाया घातला.यातील सुभेदार वाड्यापासून दुर्गाडी किल्ल्यापर्यंत गेलेलं भुयार हे आजही एक आश्चर्य त्या काळातील लोकांच्या दूरदृष्टीचा उत्तम नमुना. टिळकांनी सुरु केलेले ‘मेळ्याचे गणपती‘ (एकादशीला निरोप घेणारे) आजही कल्याणचं वेगळेपण ठळकपणे दर्शवतात.दसऱ्याला आणि गुढीपाडव्याला होणारी स्वागतयात्रा आणि या यात्रेत होणारा ढोलाचा नाद आणि लेझीमची प्रात्यक्षिकं म्हणजे पर्वणीच.
कल्याण या शहराने आजवर अनेक हिऱ्यांना जन्म दिला. भारतातील पहिल्या महिला डॉक्टर आनंदी गोपाळ जोशी, पहिल्या महिला छायाचित्रकार राधाबाई वैद्य, आणि सर्वप्रथम हलत्या चित्रांचा प्रयोग यशस्वीपणे राबवणारे आणि ‘शाम्भरीक खरोलिका’ या कृष्णाजीवनावर आधारित चलचित्र प्रयोगाचे जनक महादेव पटवर्धन ही अशीच काही मूर्तिमंत उदाहरणं.
९व्या शतकातील लोणादित्य रामेश्वर मंदिर (LONADITYA RAMESHWAR TEMPLE)
अंबरनाथला राहत असल्यामुळे आमच्याकडे पुरातन काळातील एक शिवमंदिर आहे हे आम्ही खूप अभिमानाने सांगत असू पण एका वृत्तपत्रात आलेल्या माहितीत वाचल्यावर लक्षात आलं कि शिलाहार राजांनी बांधलेली अनेक शिवमंदिरे ठाणे जिल्ह्यात अवशेष रूपाने आजही उभी आहेत. या मंदिरापैकी सर्वाधिक अवशेष रूपाने आपले अस्तित्व प्रकट करणारे लोनाडचे लोणादित्य महादेवाचे देवालय होय. अंबरनाथच्या शिवमंदिराच्या शे-पाउणशे वर्षांपूर्वी ह्या देवालयाची निर्मिती झाली. हे वाचलं आणि कल्याण पासून सुमारे ७ किमी दूर असणाऱ्या ह्या
"लोणादित्य रामेश्वर" (LONADITYA RAMESHWAR TEMPLE) मंदिरास भेट देण्यास निघालो.

मंदिराची मागील बाजू
लोनाड गावातील तलावाकाठी उभे असलेले हे मंदिर शिलाहार राजांपैकी कोणी आणि कधी बांधले ह्याचा निश्चित पुरावा नाही पण हे मंदिर खूप पुरातन आहे ह्याचे पुरावे दानपत्रातून व शिलालेखातुन उपलब्ध झाले आहेत. आषाढ वद्य ४, शके १९१९ (इ. स. ९१७) साली शिलाहार राजा अपरादित्य याने भिवंडीजवळील या मंदिराला देवाच्या पूजेसाठी "दक्षिणायन दान" म्हणून भादाणे गाव इनाम दिला. अशा आशयाचा ताम्रपट सापडला आहे ह्याचा अर्थ लोनाडचे हे शिवमंदिर सुप्रसिद्ध अंबरनाथच्या देवालयाच्या जे २७ जुलै १०६१ मध्ये बांधले होते याच्या आधी शके ९१९ (इ. स. ९१७) च्याही आधी लोनाडचे मंदिर बांधले गेले हे शिलाहार राजाच्या दानपत्रावरून कळते.
मंदिराच्या प्रवेशद्वारावरील शिल्प
द्वितीय अपरादित्य शिलाहार राजाचा मंत्री व्योमशभु यांनी लोनाडच्या मंदिराचा जीर्णोद्धार केला आणि गर्भगृहात आपल्याच नावाने व्योमशम्भू महादेवाचे शिवलिंगाची प्रतिष्ठापना केली. लंकेवर स्वारी करण्यापूर्वी समुद्राला साक्षी ठेवून रामाने ज्या शिवलिंगाची स्थापना करून प्रार्थना केली त्याच आकाररूपाचे शिवलिंग या मंदिरात असल्याने या शिवमंदिराला
"श्रीरामेश्वर मंदिर" असेही म्हंटले जाते. मंदिरावरील सुबक मूर्तींचे नमुने बघितल्यावर आज हि अवाक व्हायला होतं.

शिवलिंग

मंदिराच्या मागील बाजूस असलेली कलाकुसर
गेली कित्येक वर्षे ऊन वारा पावसात ह्या मंदिराची झीज होऊ लागली आहे. बरेचसे अवषेश ढासळले आहेत. पण ते ढासळून सुद्धा त्यावरील कलाकुसर जशी च्या तशी आहे. इतकी वाताहत होऊनही इतके जुने मंदिर त्याच थाटात उभे आहे. मंदिरावरील कलाकुसरीचे काम बघून कलाकारालाही दाद द्यावीशी वाटते. बऱ्याच लोकांना अजूनही ज्ञात नसल्यामुळे त्या मंदिराजवळ गर्दी कमी असते.


पडझड झालेल्या वास्तूंचे काही नमुने
तिथल्या गावकऱ्यांना मंदिराबद्दल माहिती सांगण्यास कोणी आहे का असे विचारल्यावर गावकऱ्यांनी सांगितले कि इतका जुना माणूस गावात शिल्लक नाही. त्यामुळे आमच्याकडे ह्या मंदिराविषयी पुरेशी माहिती नाही पण असो आज ते मंदिर ज्या पद्धतीने तेथे उभे आहे ते पाहण्याचे भाग्य असणे हे हि नसे थोडके!!! म्हणून आहे त्यात समाधानी राहून ह्याअतिप्राचीन मंदिराचे दर्शन घेऊन आम्ही पुन्हा घरच्या वाटेला लागलो.
लोनाड - बौद्ध लेणी
लेणी हा शब्द ‘लयन’ (खोदून केलेली गुहा) या संस्कृत शब्दावरून रूढ झाला आहे.
आपल्या भारतात एकूण बाराशे लेणी आहेत. बाराशे लेण्यांपैकी आठशे फक्त महाराष्ट्रातच आहेत. महाराष्ट्रात विपुलतेने मिळणारा बेसाल्ट हा अग्निजन्य दगड हे त्याचे एक कारण आहे. बौद्ध भिक्षूंमुळे महाराष्ट्रात लेण्यांची परंपरा निर्माण झाली.
दक्षिण बिहारमध्ये किंवा प्राचीन काळातील मगध प्रांतामध्ये प्रथम बुद्धाच्या समकालीन आणि थोड्या नजिकच्या काळामध्ये आजीवक नावाचा पंथ होता. त्या पंथातील लोक संन्यस्त होते. ते वनामध्ये वास्तव्य करत. वर्षभर ते भ्रमंती करत. पण पावसाळ्यात मानवी वस्तीपासून दूर त्यांच्या राहण्याची सोय व्हावी म्हणून अजातशत्रू राजाने पहिली लेणी तयार करून घेतली. त्या लेण्यांना ‘वर्षावास’ असे म्हटले जात असे. नंतर ती सांस्कृतिक केंद्रे बनली. महाराष्ट्रातील लेणी खोदण्याची जी परंपरा आहे ती बिहारमधील नागार्जुन टेकड्या किंवा लोमेश ऋषींची लेणी किंवा सोनभांडार या जांभा दगडातील लेण्यांच्या समुहाशी साधर्म्य असणारी आहे.
कल्याणजवळील 'लोनाड' येथील लेणी गेली १५०० वर्षे निसर्गाशी लढा देत महाराष्ट्राच्या सांस्कृतिक इतिहासाची साक्ष देत उभी आहेत.
लोनाड लेण्यांचे वर्णन इतिहासकार 'एक अपूर्ण राहिलेले अजंठा' असे करतात.
हि लेणी इ स सन ५ ते ७ व्या शतकात कोकणचे मौर्य राजे यांच्या काळात कोरण्यात आली आहेत.
भारतातील लेण्यांची विभागणी साधारण बौद्ध गुंफा, ब्राह्मण गुंफा आणि जैन गुंफा असे करण्यात येते.
लोनाडची लेणी हि जेव्हा १८७५ मध्ये सिनक्लेअर या अधिकाऱ्याने शोधली तेव्हा बाह्य स्वरूपावरून या लेण्याचे वर्गीकरण ब्राह्मण गुंफा असे करण्यात आले.
परंतु अधिक अभ्यासानंतर हि लेणी बौद्ध गुंफा आहेत असे दिसून आले.
लोनाडच्या लेण्यांमध्ये अनेक जातककथा सुबकरीत्या शिल्पपट्टिकांमध्ये कोरण्यात आली आहेत.
जातक कथांचे माहिती आणि लेण्याचे वर्णन पुढील लेखात...

लोनाड शिल्पपट्टिका क्र. १
सिनक्लेअर यांची नोंद:
next the well, contains a man seated on a square throne, left leg curled in front of
him, left hand resting on left knee. Right hand raised, as if to enforce his discourse, holds a
fruit or flower (lotus?). Woman standing to his right, two destroyed figures to left.
मराठी अनुवाद :
पाण्याच्या टाकीच्या बाजूला असलेल्या पहिल्या शिल्पात एक व्यक्ती चौकोनी सिंहासनावर डावा पाय दुमडून बसला आहे.
त्याचा डावा हात डाव्या गुडघ्यावर ठेवला आहे. उजवा हात आज्ञा देण्यासाठी वर उचलला आहे. उजव्या हातात बहुदा फळ किव्वा फुल आहे.
त्याच्या उजवीकडे एक स्त्री उभी आहे तर डावीकडील दोन व्यक्तींशिल्पांची स्थिती खूप वाईट आहे.

अर्थ :
विश्वंतरची आई फुसती/माया हि एक पूर्वजन्मीची राजकुमारी होती. तिने अनेक महान धार्मिक केली त्यामुळे तिचा पुढचा जन्म हा स्वर्गातील इंद्राची राणी म्हणून झाला. जेव्हा तिचा स्वर्गातील काळ संपत आला, तेव्हा इंद्राने तिला दहा वरदान दिले. तेव्हा तिने मानवरूपात बोधिसत्वची आई बनण्याचे वरदान मिळवले. शिल्पपट्टिकातील प्रसंग हा इंद्र राणी फुसती/मायाला 'कर्माचे फ़ळ' म्हणून बुद्धाची आई होण्याचे वरदान देतानाचा आहे

लोनाड लेणी - शिल्पपट्टिका आणि जातककथा
भारतातील लेणी हि सामाजिक आणि सांस्कृतिक समरसतेचे प्रतीक आहेत. भारतातील अनेक लेणी हि वेगवेगळ्या पंथीयांच्या शिल्पकलेच्या प्रेरणेचा परिपाक आहेत. उदाहरणार्थ कार्ल्याच्या लेण्यांचा प्रमुख भाग हे हीनयान पंथीय आहे, पण त्याचा बाहेरील भाग हा महायानपंथीय आहे. कान्हेरीचा क्रमांक तीनचा स्तूप हा मूळचा हीनयान आहे पण नंतर महायानांनी त्यावर काम केले. या लेण्यामधून जशी पंथसहिष्णुता अधोरेखित होते त्याचप्रमाणे त्याकाळातील समाजाची सामाजिक जाणिव देखील दर्शित होते. भारतातील बहुतेक लेणी हि राजांनी किंवा त्यांच्या मंत्र्यांनी बांधलेल्या नसून लोकांनी त्यांच्याकडील पै पै दान देऊन बांधली आहेत. कल्याण येथिल व्यापाऱयांनी लेण्यांसाठी दिलेल्या देणगीचे उल्लेख कान्हेरी, कार्ले येथे पाहायला मिळतात.
लोणाडची लेणी जानेवारी १८७५ मध्ये सिनक्लेअर या अधिकाऱ्याने स्थानिक लोकांच्या मदतीने शोधली व या लेण्यावरील शोध निबंध प्रकाशित केला. पुढे डॉ. बर्गीस यांनी देखील १८८० मध्ये आधी प्रकाशित माहितीवरून अधिक अभ्यास करून शोध निबंध प्रकाशित केला. परंतु त्यानंतर १४० वर्षात या लेण्यांची अपेक्षित इतकी निगा राखली गेली नाही. आज या लेण्याच्या अधिक माहितीसाठी सिनक्लेअर यांच्या त्या काळातील नोंदीची मदत घ्यावी लागते.
या लेण्याच्या द्वारमंडपाला चार खांब असून मधला खांब तुटलेला आहे. या खांबाच्या पडझडीतूनच द्वारमंडपाच्या वर असलेल्या शिल्पपट्टिकांची वाताहत झाली आहे. ओसरी ४८x१० फूट आहे. पुढे गाभाऱ्यात जाण्यासाठी ३ दरवाजे आहेत. विहारात शिरतानाच डावीकडे ८ फूट खोल पाण्याची टाकी आहे. सिनक्लेअर यांच्या प्रबंधामध्ये अशी नोंद आहे कि स्थानिकांचा अनुभव असा आहे कि जवळील उल्हास नदीच्या भरती-ओहोटीच्या वेळेतील पाण्याच्या कमी अधिक पातळीप्रमाणे या डोहातील पाण्याची पातळी कमीअधिक होते.
द्वारमंडपाच्या वरील बाजूस १७ शीलपट्टीका कोरण्यात आल्या असून त्या १ ते २ फूट कमी-अधिक असमान रुंदीच्या आहेत. उजवीकडे एक ५ फुटाचे सुंदर शिलप कोरण्यात आले आहे. या शिल्पांमधून 'वेसंतर' या गौतम बुद्धांच्या एका पूर्वजन्माची कथा सांगणाऱ्या प्रसिद्ध जातककथेतील प्रसंग कोरण्यात आले आहे. याचप्रमाणे एकाच कथेला वाहून घेतलेले हे भारतातील एकमेव लेणे. शिल्पपट्टिका या कथेतील कोणता प्रसंग चित्रित करतात हे आपण पुढील लेखात बघू. पण तत्पूर्वी वेसंतर हि जातक कथा संक्षिप्त मध्ये पाहू.
वेसंतर हा सिवी राज्याच्या संजय नामक राजांचा पुत्र. जन्मत:च तो बोलू लागला होता. लहानपणापासूनच आपल्या दान, शील, सत्य या गुणांमुळे त्याची प्रसिद्धी चहूकडे पाहोचते. लग्नानंतर त्याला दोन पुत्र प्राप्त होतात. वेसंतरकडे पाऊस पडू शकणारा सफेद हत्ती असतो. कलिंग देशात दुष्काळ पडल्याने तेथील काही लोक हा हत्ती मागण्यासाठी वेसंतरकडे येतात. वेसंतर त्यांना हत्तीचे दान करून टाकतो. यामुळे सिवी राज्याची प्रजा चिडते. प्रजेच्या मागणीमुळे संजय राजा वेसंतरला हद्दपारीची शिक्षा सुनावतो. एक मोठे दानसत्र पार पाडून पत्नी व दोन मुलांसह रथात बसून तो बाहेर पडतो. वाटेत काही ब्राह्मणांनी घोडे व रथही मागून घेतल्यामुळे पदयात्रा सुरू होते. ते वनात राहतात. फळे, कंदमुळे गोळा करणे, पाणी भरणे वगैरे कामे पत्नीच करते. मग एक म्हातारा ब्राह्मण आपल्या तरुण पत्नीच्या सेवेसाठी दोन्ही मुलांना मागून घेतो. वेसंतर त्याचेही दान करतो. पत्नीला याचे दु:ख झाले तरी ती नव-याच्या दातृत्वाचे समर्थन करते. अखेर इंद्र स्वत: ब्राह्मणाच्या रूपात येऊन पत्नीचे दान मागतो. पत्नीच्या संमतीने वेसंतर त्यालाही तयार होतो. येथे दानपारमितेची सत्त्वपरीक्षा पूर्ण होते. इंद्र प्रकट होतो. वेसंतराला वर देतो. मग सर्व प्रश्न सुटतात. शेवट व्हायला तेवढा गोड होता. सिवी राज्यात सर्व एकत्र जमतात. वेसंतराचा राज्याभिषेक होतो. नंतर तो दानच करत राहतो व अखेर तुशित नामक स्वर्गात जातो.

कल्याणचे पेशवेकालीन महालक्ष्मी मंदिर
गेली अनेक वर्षे नवरात्रोत्सवादरम्यान कल्याणच्या टिळक चौैकमधील महालक्ष्मी देवीचे मंदिर कल्याणकरांसाठी आकर्षण बिंदू ठरला आहे. नवसाला पावणारी देवी म्हणून कल्याणच्या महालक्ष्मी देवीला ओळखले जाते
महालक्ष्मी देवीचे हे मंदिर पेशवकालीन आहे, असे जाणकार सांगतात. कर्जत, कसारा ते थेट मुंबईपासून भाविक या देवीच्या दर्शनाला येत असतात. ठाण्याच्या कलेक्टरेट गॅझेटमध्ये हे मंदिर १८०१मध्ये उभारल्याची नोंद आहे. काहींच्या मते मुघल साम्राज्याच्या दरम्यान मंदिराला नुकसान पोहोचू नये, यासाठी मंदिर कौलारू बांधण्यात आले.
मोहन पिंपळखरे आणि माधव पिंपळखरे यांच्या पूर्वजांनी हे मंदिर बांधले असून सध्या या मंदिराची देखरेख ट्रस्ट करत आहे. नवरात्रात भारुड, किर्तन असे विविध कार्यक्रम केले जातात. तसेच अष्टमीला घागर फुंकण्याचा कार्यक्रम केला जातो. नवारात्रात रंगानुसार मंदिरात फुलांची सजावट केली जात असते. तसेच, दिवसातून तीनदा आरती केली जाते.
अतिशय साध्या आणि शांततेने नवरात्रोत्सव साजरा करण्याचा या मंदिराचा प्रयत्न असतो. देवीला वाहण्यात येणारे तांदूळ आणि साडी वनवासी कल्याण आश्रमात दिले जाते. तसेच, वर्षभरात मंदिरात जमा होणाऱ्या निधीतील ठराविक रक्कम जव्हार, मोखाडा आदिवासी भागातील जनतेसाठी दिली जाते.
माहिती स्त्रोत - मटा


लोकमान्य टिळकांची कल्याण भेट - २३-ऑगस्ट-१९०६
कल्याण शहराला जी सामाजिक, सांस्कृतिक आणि संस्थात्मक परंपरा लाभलेली आहे, त्या परंपरेचाच एक भाग म्हणजे कल्याणमध्ये साजरे होणारे सार्वजनिक गणेशोत्सव. लोकमान्यांनी पुण्यात १८९३ या वर्षी सार्वजनिक गणेशोत्सवाला प्रथम सुरुवात केली. जाती-जातींमध्ये विखुरला गेलेला हिंदू समाज एकत्र यावा, गणेशोत्सवाच्या निमित्ताने समाजप्रबोधन व्हावे, त्याकाळी देश पारतंत्र्यात असल्याने नागरिकांच्या मनात देश, धर्म, स्वातंत्र्य याबद्दल अभिमान व प्रेम निर्माण व्हावे, गणेशोत्सवाच्या निमित्याने समाजाने एकत्र येऊन स्वराज्याच्या लढ्यासाठी त्याचा प्रभावी शस्त्र म्हणून वापर करता यावा, या उदात्त हेतूंनी लोकमान्यांनी सार्वजनिक गणेशोत्सवाची मुहूर्तमेढ रोवली. यानंतर लगेचच पुढील दोन वर्षांनी म्हणजे १८९५ या वर्षी लोकमान्यांच्याच प्रेरणेने कल्याणमधल्या सार्वजनिक गणेशोत्सवाला प्रारंभ झाला. सुभेदार वाडा सार्वजनिक गणेशोत्सवाची सुरुवात १८९५ या वर्षी सुभेदार वाडा या ऐतिहासिक वास्तूत झाली. गेल्याच वर्षी या गणेशोत्सवाने शतकोत्तर रौप्य महोत्सव दिमाखदाररित्या साजरा केला. या गणेशोत्सवास १८९५ या वर्षी प्रारंभ झाल्यापासून उत्सवाचे जनक लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांनी कल्याणात येऊन उत्सव पाहून त्यांस आशीर्वाद द्यावा, अशी सर्वांची फार इच्छा होती. हा योग १९०६ या वर्षी जुळून आला. त्या वर्षी मात्र लोकमान्यांनी कल्याणकरांचे आमंत्रण स्वीकारून व उत्सवप्रसंगी हजर राहून कल्याणकरांना धन्य केले.
२३-ऑगस्ट-१९०६ रोजी गणेशोत्सवाकरिता लोकमान्य कल्याण येथे आले तेव्हा त्यांचे उचित असे स्वागत कल्याणकरांनी केले. राजेरजवाड्यांच्या मिरवणुकीचे वर्णन आपण वाचतो, पण या मिरवणुकींचे वर्णन फिक्के पडेल असा अपूर्व थाट लोकमान्यांच्या आगमन मिरवणुकीचा होता. दिवाळीतदेखील होणार नाही, असा दीपोत्सव कल्याणकरांनी लोकमान्यांच्या सन्मानार्थ मोठ्या आनंदाने केला. या प्रसंगाचे वर्णन ‘अरुणोदय परशुराम’च्या अंकात नमूद केलेले आहे. लोकमान्यांचे कल्याणच्या रेल्वे स्थानकावर स्वागत करण्यासाठी सुमारे दीड हजारांनी जनसमुदाय जमला होता. ठाणे जिल्ह्यातल्या विविध गावांमधून नागरिक आणि वर्तमानपत्रांचे प्रतिनिधी आले होते. रेल्वे गाडी स्थानकात येताच, शिवाजी महाराज आणि लोकमान्य टिळकांच्या नावांचा जयजयकार झाला. लोकमान्यांच्या मिरवणुकीला स्थानकावरून प्रारंभ झाला. मिरवणुकीत प्रचंड जनसमुदाय सामील झाला. काही अंतर गेल्यावर काही जणांनी मिरवणुकीच्या गाडीचा घोडा सोडून गाडी भारताचार्य चिंतामण राव वैद्य यांच्या घरापर्यंत स्वतः ओढून नेली.
सुभेदार वाड्यात लोकमान्यांचे आगमन होताना नागरिकांनी त्यांच्या स्वागतासाठी ठिकठिकाणी कमानी उभारल्या होत्या. रांगोळ्या काढल्या होत्या, तसेच दीपोत्सव केला होता. मिरवणुकीत छत्रपती शिवाजी महाराज, लोकमान्य टिळक, समर्थ रामदास स्वामी, वंदे मातरम्, स्वातंत्र्यदेवी यांच्या नावांचा जयघोष चालला होता. लोकमान्यांवर ठिकठिकाणी पुष्पवृष्टी झाली. गणेशोत्सवातील लोकमान्यांच्या सभेचे अध्यक्षस्थान भारताचार्य चिंतामण राव वैद्य यांनी स्वीकारले होते. भारताचार्य वैद्य यांनी प्रास्ताविक भाषण करून लोकमान्यांना भाषण करण्याची विनंती केली. टाळ्यांच्या कडकडाटात लोकमान्यांनी आपल्या भाषणास प्रारंभ केला. लोकमान्य म्हणाले, “राष्ट्र कितीही गरीब वा श्रीमंत असो, कितीही दरिद्री असो, कितीही परतंत्र असो, पण त्याला उत्सव माहिती नसेल तर ते राष्ट्र पशूच होय. वर्षातून एक दिवस तरी असा पाहिजे की त्या दिवशी संसाराची दगदग बाजूला ठेऊन माणसाने आपली सर्व तर्हेने स्थिती कशी आहे याचा विचार करावा. राष्ट्रात जागृती होणे फार महत्त्वाचे आहे. आपणामध्ये एकराष्ट्रीयतवाची कल्पना नव्हती, त्यामुळे आमची अशी दशा झाली आहे, मनुष्य नराचा नारायण होईल हे तत्त्व आमच्या धर्माइतके स्पष्ट कोणत्याच धर्मात सांगितले नाही. इतके सामर्थ्यवान आपण असताना हे सामर्थ्य आपणांस समजत नाही, हा आपला दोष आहे. काळ हा व्यापक आहे. त्याचा फायदा घेऊन आपण पुढे जाऊ लागलो, तर पाऊल लवकरच पुढे पडेल. शरीराप्रमाणे आपली मनेही स्वदेशी झाली पाहिजेत. आपण स्वदेशीच आहोत. त्यामुळे स्वदेशी विचारांची दृष्टी सदैव आपल्या अंतःकरणात झाली पाहिजे. ”राष्ट्रभक्तीने ओतप्रोत भरलेल्या लोकमान्यांच्या या भाषणाने उपस्थित जनसमुदाय कृतकृत्य झाला. सुभेदार वाडा सार्वजनिक गणेशोत्सवाच्या १९९४ साली झालेल्या शतक महोत्सवी वर्षाच्या, तसेच २०१९ साली झालेल्या शतकोत्तर रौप्यमहोत्सवी वर्षाच्या आगमन मिरवणुकीत लोकमान्यांचा देखावा आयोजित करण्यात आला होता.

चले जाव आंदोलन आणि कल्याण
८ ऑगस्ट १९४२ रोजी काँग्रेस अधिवेशनामध्ये संपूर्ण स्वराज्यासाठी भारतभर नागरी असहकार चळवळीचा ठराव मंजूर झाला. महात्मा गांधींनी भारत छोडोचा नारा देऊन ब्रिटीशांविरोधात स्वातंत्र प्राप्तीसाठी आंदोलन उभारले. कल्याणकरांनी कधी वैयक्तिक सत्याग्रह किव्वा कधी सामूहिक आंदोलनात सहभागी होऊन भारताच्या स्वातंत्रलढ्यात प्रत्येक पावलावर ब्रिटिशांविरुद्ध लढा उभारण्यात मदत केली. कांजी गोविंद करसन यांनी छत्रपती शिवाजी महाराज चौकात २००० कल्याणकारांसह सत्याग्रह आणि युद्धविरोधी घोषणा या स्वरूपाचे आंदोलन केले. रामभाऊ पटवर्धन यांनी जपानच्या युद्धरुपी जाळ्यात अडकलेला ब्रिटिशरूपी सिंह आणि त्याची भारतीयांकडून मुक्तता असे उपहासात्मक व्यंगचित्र काढून निषेध नोंदवला. प्रभातफेर्या, बुलेटिन वाटप, खादी प्रसार, स्वातंत्रदिन साजरा करणे असे अनेक कार्यक्रम करून ब्रिटीशराज विरुद्ध एक असे चैतन्यपूर् वातावरण कल्याणमध्ये होते. वंदे मातरम घोषणांनी अनेक परिसर दुमदुमायचे. टिळक चौक येथील पोलीस चौकी जाळण्याचा देखील प्रयत्न झाला. अनेक कार्यकर्त्यांना यामुळे अटक होऊन अनेक वर्ष तुरुंगवासदेखील झाला. लष्कराला देखील कल्याणमध्ये काही काळ पाचारण करण्यात आले होते. एकंदरीत कल्याणकरांनी स्वातंत्रलढ्यात झोकून देऊन पुढच्या अनेक पिढींसाठी आदर्श निर्माण केला. आजचा दिवस हा कल्याणकरांच्या अशा कामगिरीच्या आणि एकंदरीत वाटचालीच्या स्मरणार्थ साजरा करण्याचा.

१ मे १८५४:- रेल्वेचा कल्याण स्पर्श
आजच्याच दिवशी १६५ वर्षांपूर्वी दिवशी आपली कल्याणनगरी जगाशी रेल्वे मार्फत जोडण्यात आली.
जॉर्ज स्टीफनसन याने २५ जुलै १८१४ साली वाफेच्या इंजिनाचा प्रयोग सिद्ध करून दाखवला. त्यानेच २७ सप्टेंबर १८२५ ला ताशी १२ मैल वेगाने धावणारी पहिली रेल्वेगाडी जगाला धावून दाखवून दिली. पुढे १५ सप्टेंबर १८३० साली जगात पहिल्यांदा सर्वसामान्य जनतेसाठी रेल्वेगाडी धावली ती मँचेस्टर ते लिव्हरपूल मध्ये. १८४० पर्यंत संपूर्ण युरोप मध्ये रेल्वेचे जाळे विणले गेले होते. त्याचा परिणाम वाढते औद्योगिकीकरण, वाढते उत्पादन, वाढणारे ग्राहकत्व या स्वरूपात दिसत होता.
त्याच धरतीवर आशिया खंडातील पहिली रेल्वे मुंबई येथे आणण्याचा विचार मुंबईचा मुख्य अभियंता जॉर्ज क्लार्क याच्या डोक्यात आला. १३ जुलै १८४४ ला मुंबईत सभा होऊन 'बॉम्बे ग्रेट ईस्टर्न रेल्वे' हि कंपनी स्थापन होऊन मुंबई ते बोरघाट ठाणामार्गे रेल्वे जाईल असे घोषित करण्यात आले. हे सर्व होत असताना इंग्लंड मधील श्रीमंत उद्योजक काही स्वस्थ बसणारे नव्हते. त्यांनी 'GIPR /ग्रेट इंडिया पेनिन्सुला रेल्वे' या कंपनीची स्थापना करून आपल्या प्रतिनिधीला भारतात पाठवले व आपले राजकीय वजन वापरून दोन्ही कंपन्यांनी संयुक्तपणे काम करावे अशा सूचना दिल्या.
मुंबई ते बोरघाट हा मार्ग सोपा निश्चितच नव्हता. सायन जवळील भागात दलदल होती, मुंब्राजवळ खाडीवर पूल बांधावा लागणार होता, पारसिक डोंगरामध्ये बोगदा काढावा लागणार होता. परंतु सर्व अडचणींवर मत करत हा प्रकल्प आधी ठरवलेल्या खर्चाच्या २०% कमी पैश्यात झाला.
जगात पहिली रेल्वे सुरु झाल्यावर केवळ २४ वर्षातच आशिया खंडातील पहिली रेल्वे मुंबई-ठाणे मार्गावर धावली. भारतातील पहिली रेल्वे १६ एप्रिल १८५३ ला मुंबई – ठाणे दरम्यान सुरु झाली. त्यांनतर एका वर्षातच १ मे १८५४ रोजी रेल्वेने आपल्या कल्याणनगरीत प्रवेश केला. मुंबईचा गर्व्हनर लॉर्ड एलफिन्सटन याने २५० युरोपिअन आणि स्थानिक नागरिकांसमवेत हा कल्याणचा आगगाडी दौरा पूर्ण केला.. सायंकाळी ४ वाजून ५० मिनीटांनी बोरीबंदर स्थानकावरुन सुटलेली ही गाडी १ तास १० मिनीटांचा प्रवास करुन सायंकाळी ६ वाजता कल्याणला पोहोचली. कल्याण स्टेशनपर्यंत ही गाडी नेण्यात आली नाही तर स्टेशनच्या आधी खाडीकिनार्यालगत गाडी थांबवण्यात आली. येथेच सैनिकी बॅन्डपथकाने बॅन्डची सलामी दिली. मेजवानी देखील येथेच देण्यात आली. कल्याणपर्यंत रेल्वे धावली या आनंदाप्रित्यर्थ फटाक्यांची आतषबाजी देखील करण्यात आली. तीन तासाच्या मनोरंजनानंतर जेवण झाल्यानंतर रात्री नऊ वाजता परतीच्या प्रवासाला निघालेली गाडी रात्री अकरा वाजता बोरीबंदरला परत पोहोचली.
हि भारतीय रेल्वे हा फक्त वाहतूक क्षेत्रातील घटना नसून भारताच्या सर्वांगीण इतिहासावर याची चांगली-वाईट छाप आहे. रेल्वेचा विकास आणि बाजूला मुंबईची पहिली कापडगिरणी किव्वा गिरणगावाचा पाया, तेथील मराठी संस्कृती यांनी मुंबईच्या आणि भारताच्या इतिहासाला एक वळण दिले.कल्याणचे म्हणायचे तर रेल्वे आल्यानंतर दुसऱ्याच वर्षी १ नोव्हेंबर १८५५ रोजी कल्याणमध्ये नगर पालिकेची स्थापना करण्यात आली.
आणि जाता जाता संयुक्त महाराष्ट्र चळवळीच्या अनेक परिषदांची कल्याण आणि कल्याणकर साक्षीदार आहेत. त्याविषयी सविस्तरमध्ये पुढे बघूच. पण कल्याणला औद्योगिकीकरणाशी जोडणाऱ्या आणि मुंबईला महाराष्ट्राशी जोडणाऱ्या आजच्या दिवशी 'मी कल्याणकर' तर्फे महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा