Friday, November 21, 2025

नाशिक - आठवणी आणि इतिहास

 https://www.facebook.com/groups/846904253319743/
 
श्री.सुंदर नारायण मंदिर १८७०
(The British Library)
आपल्या गोदावरीचा पूर्वीचा घाट किती छान होता....
आता कुंभामेळ्या मध्ये काय करतील घाटाचे सुशोभीकरण देव जाणे...🤷🏻‍♂️
घाटला पुरातन प्रमाणे करता आलं तर बर...
 
सुंदर नारायण मंदिराकडुन होळकर पुलापर्यंत पायऱ्या होत्या .पुलाखाली अहिल्याबाई होळकर यांनी बांधलेला सुंदर दगडी घाट होता.इंग्रजांनी व्हिक्टोरिया पुल बांधायला घेतला तरी या पायऱ्यांना व घाटाला मुळीच बाधा आणली नाही.1970 पर्यंत रे सारे तसेच होते.नंतर मात्र सुधारणेच्या नावाखाली जुने बांधकाम अविचाराने सारेच तोडण्यात आले .जुने सौंदर्य लयास गेले. होळकर पुलाची ब्रिटिशकालीन कोनशीला मेकॅनिकल गेटच्या बांधकामात होत्याची नव्हती केली.नदीपात्रातील जुने खडक तोडण्यात आले.
सगळ्यात महत्वाचे म्हणजे होळकर पुलाखालून एकमुखी दत्ताच्या समोर अखंड पाण्याने खळाळत वाहणारी गोदावरी इतिहासजमा होऊन केवळ प्रदूषित पाण्याचे डबके झाली .
 
 
फोटो टाकण्यास कारण की लहानपणापासून ते आजगायत अनेक आठवणी आहेत या मंदिराच्या.....अगदीच काही दिवसांपूर्वी याच ग्रुप मध्ये त्या आपण सगळ्यांनी share ही केल्यात पण आज पर्यंत एक गोष्ट नाही कळाली की याचे नाव ढोल्या गणपती का ❓
याची काही कहाणी काही आख्यायका माहिती आहे का ❓
 सध्याच्या काळात कला आणि कल्पकतेपेक्षा अवाढव्य,अचाट,अक्रारळ-विक्राळ करून दाखवणे हे प्रस्थ फार माजले आहे.
पूर्वी घरातल्या आणि बाहेर देवळातल्या गणपतीची मूर्ती हा माफक उंचीची असायची. म्हणून त्या काळात ह्या गणपतीला बघून लोक त्याला ढोल्या गणपती म्हणायचे, असे समजते.
६४-६५ च्या काळात माझी आजी मला या बाप्पाच्या दर्शनाला न्यायची. एकदा मूर्ती कडे बघून तीला हसू आलं, पण बापाची क्षमा मागून ती म्हणली माझ्या नातवाचे बाळसे बघूनच मला तुझ्या मुर्ती कडे बघून हसू आले, असे माझी आई सांगायची. (कृपया, फक्त तात्पर्य लक्षात घ्यावे , व्यक्तिगत संदर्भ सोडून द्यावा ही विनंती)
 
 

 
 
 
वणीगड निवासिनी श्री सप्तश्रुंगी देवी 🙏
देवीचा महिमा गडाचे रहस्य,
सप्तश्रुंग गडाचे रहस्य भाग-2
वणी गडाच्या पायथ्याशी "नांदुरी"नावाचे गांव आहे,नांदुरी गावापासून ते गडाच्या माचीवर वसलेल्या वणी गावापर्यंत जाण्यासाठी सुमारे 11 की.मी.लांबीचा वळणावळणाचा घाटमार्ग आहे, वणीगड म्हणजे अंगावर येणारा भव्य डोंगरचं,याला सप्तशिखरांचा स्वामी म्हणतात, आजूबाजूला जे सात शिखर आहेत,त्यांना सात देवींचे लघुरूप लाभले आहे, त्या सात शिखरांच्या मधोमध वसलेला गड म्हणजेच "सप्तशृंगगड"
वणी गड हिवाळ्यात सर्वत्र धुके, उन्हाळ्यात निखळ-नितळ तर पावसाळ्यात हिरवागार नटलेला असतो, गडावर आजही प्राचीन/ऐतिहासिक अनेक वास्तू नजरेस पडतात त्यात दोन शिवालये, गणपती मंदिर,एक अष्टकोनी बारव, पाण्याचे टाके, एक तलाव, काही तीर्थ कुंड, एक पायरीमार्ग आणि देवी-देवतांच्या विविध मुर्त्या आहेत,पूर्वेला शिवभक्त मार्कंडेय ऋषींचा पर्वत आहे, जो शीतकड्यावरून फारच सुंदर दिसतो, मार्कंडेय ऋषींनी अनेक काळ इथे घोर तपश्चर्या केलेली आहे,पर्वतावर असलेल्या अनेक गुहा याचा पुरावा आहे, यातील एक गुहा प्रशस्त आहे, जी डोंगराच्या एका कपारात आहे, महिषासुराने वणी या भागात थैमान घातले होते,
मार्कंडेय ऋषींनी देवीची यज्ञ साधना केली व देवी प्रसन्न झाली,देवीने इथे महावतार घेऊन महिषासुराचा वध केला,महिषासुराने देवीला "माते "म्हणून शेवटची इच्छा मागितली,की मला इथे तुझ्या पायाशी राहू दे, देवीने त्याची इच्छा मान्य केली, वं त्याला पायथ्याशी जागा दिली, आजही भाविक आधी महिषासुराचे दर्शन घेतात व त्यानंतर देवी मंदिराकडे मार्गस्थ होतात, महिषासुराला देवीचा दास संबोधले जाते व त्याला बोकडाचा बळी दिला जातो,देवीच्या महावताराचे दर्शन झाल्याने मार्कंडेय ऋषींनी देवीची "दुर्गा" या शब्दात प्रशंसा केली व "दुर्गासप्तशती" हा ग्रंथ लिहिला, या ग्रंथातं देवीच्या महिमेचे वर्णन केले आहे,
पुरातन काळापासून भक्तगन देवीला विविध नवस करतात, प्रत्येकाचा काही ना काही तरी मानस असतोच,
नवस पूर्ण झाल्यानंतर पुन्हा एकदा देवीला भेटायला जाणे अगत्याच असते, याला नवस फेडणं असं म्हणतात,
जसं की पुतप्राप्ती, विवाह, नोकरी, आजारपण यासाठी नवस बोलले जातात,त्यानंतर काही भाविक शतचंडी, नवंचंडी असे यज्ञ याग करून,देवीला प्रसन्न करून घेतात, इथे देवीचा गोंधळ घालण्याचीही परंपरा आहे, घरात एखादं शुभकार्य सुखरूप होण्यासाठी, किंवा शुभकार्य झाल्यानंतरही गोंधळ घालायला भाविक येतं असतात,ग्रामीण भाषेत त्यास कंदुरी किंवा देवदेव म्हटले जाते, सुहासिनी देवीची खणा-नारळाने ओटी भरतात,इथल्या बाजारात हिरवी साडी, हिरवा खण,हिरव्या बांगड्या मोठ्या प्रमाणात विक्रीसं असतात,
नवसाला पावणारी असा देवीचा लौकिक आहे,देवी नवसाला पावतेच अशी भक्तांची पार श्रद्धा आहे,
या भागात कुठलाही साप-नाग, गिधाडे, कावळे दिसत नाहीत, हे इथलं अजून एक रहस्य आहे, नाथ सांप्रदायातील मच्छिन्द्रनाथांना देवीने इथे शबरी विद्येचे ज्ञान दिले होते, मच्छिन्द्रनाथानी देवीला "आई" म्हणून हाक मारली, देवीने नाथांना"बाळ" म्हणून प्रतिसाद केला, वं नाथांना इथेच रहायला सांगितले, तेव्हा अनाथांची आई जगतजननी असे देवीचे नामकरण झाले, सप्त शिखरांच्या मध्ये राज्य करणारी राजराजेश्वरी,तर आलेल्या प्रत्येक भक्ताच्या मनोकामना पूर्ण करणारी मनोकामेश्वरी म्हणून देवीचा उदो-उदो केला जातो,
राम-रावण युद्धाप्रसंगी इंद्रजिताच्या बाणाने लक्ष्मण बेशुद्ध पडले,त्यावेळी हनुमानाने द्रोनगिरी पर्वत उचलून आणला,
त्या पर्वताचा काही भाग या शिखरावरं पडला,त्यामुळे या गडावर संजीवनी बुटी सुद्धा आहे, मात्र कलीयुगात ती अदृश्य आहे,औदुंबराच्या एका झाडाच्या खोडात श्री दत्तगुरूंचा वास आहे, एका पांढऱ्या नागाच्या रूपात ते दर्शन देतात,मात्र त्यांचं दर्शनही दुर्लभचं, श्रीराम, लक्ष्मन व सीतामाई पंचवटीत असतांना ते देवीच्या नित्य दर्शनासाठी येतं असतं असे म्हटले जाते, देवीच्या 470 पायऱ्यांचा नवसही काही भक्त फेडतात,जसं की या पायऱ्यांवर दिवा लावणे, फुल ठेवणे,इ.
इ. सन 1672 मध्ये स्वराज्याचा राजे ,छत्रपती शिवाजी महाराज,सुरतेवर छापा टाकून राजगडावर परतत होते,
महाराजांकडे सोने-नाणे, जड-जवाहीर, हिरे-मोती असा ऐवज होता, मुघलांपासून ते वाचवण्यासाठी महाराजांनी यां गडाचा आश्रय घेतला, आणि देवीचे दर्शन घेतले,
जाता-जाता पुढची वाट अशीच सुखरूप पार पडू दे आई
अशा शब्दात देवीचा निरोप घेतला आणि महाराज सुखरूप राजगडावर पोहचले,निवृत्तीनाथांनी संजीवन समाधी घेण्याआधी,देवीचे दर्शन घेतल्याचे सांगितले जाते,
इथल्या स्थानिकांकडून, साधू-सतांकडून अनेक कथा,कहाण्या,अख्यायिका ऐकायला मिळतात ज्यात देवीचा चमत्कार, महती कळते, आणि यां ठिकाणावर, देवी आईवर अधिकच विश्वास बळकट होतो,
देवीला माय, माऊली, माता, आदिमाया, भगवती, आदिशक्ती या नावांनी भक्तगण हाक मारतात,
आजपर्यंत अनेक गाण्यांमध्ये देवीचे गुणगाण ऐकायला मिळते, त्यातील "चैत्र महिना मा" आणि "डोंगर हिरवगार" ही अहिराणी गाणी प्रसिद्ध आहेत.
सूचना:- देवीच्या माथ्यावरील शिखरावर जाण्यास मनाई आहे,सामान्य मनुष्य तिथे पोहचू शकत नाही,
* आजही महिषासुरमर्दीनी या डोंगरात जिवंत वास्तव्य करते 🙏🚩
सप्तश्रुंगी देवी महाकाली, महासरस्वती आणि महालक्ष्मी
या त्रिगुणात्मक स्वरूपात इथे अखंड निवास करतं आहे
 
  पंचवटी परिसरात असलेली ही सर्व मंदिरे पेशव्यांच्या काळात बांधली गेली आहेत.
सुंदर नारायण मंदिर इ.स. १७५६ मध्ये गंगाधर यशवंत चंद्रचूड यांनी बांधले. मंदिर काळ्या पाषाणात बांधलेले असून त्यावरील कोरीव काम अप्रतिम आहे. मंदिरात श्रीविष्णु म्हणजेच नारायण, देवी लक्ष्मी आणि वृंदा यांच्या मूर्ती आहेत. समोर विष्णूचे वाहन म्हणजे गरुड आहे. एका पुराणकथेनुसार वृंदेने दिलेल्या शापामुळे विष्णूचे शरीर काळे पडले होते. त्याने गोदावरी नदीमध्ये डुबकी मारल्यानंतर त्याची कांती उजळली आणि तो सुंदर झाला.
ह्या मंदिरासमोर कपालेश्वर मंदिर आहे. कार्तिक शुद्ध चतुर्दशी म्हणजेच वैकुंठ चतुर्दशीला श्रीविष्णु आणि कपालेश्वर (शंकर) म्हणजेच हरि आणि हर यांच्या भेटीचा हृद्य सोहळा इथे होतो.
सरदार रंगराव ओढेकर यांनी इ.स. १७९० मध्ये बांधलेले काळा राम मंदिर सुद्धा काळ्या पाषाणात बांधलेले आहे. वनवास काळात ह्याच ठिकाणी श्रीरामाचे वास्तव्य होते असे मानतात. विस्तीर्ण प्राकार असलेल्या ह्या मंदिरात श्रीराम, सीता आणि लक्ष्मण आणि समोर हनुमंत यांच्या मूर्ती सुद्धा काळ्या पाषाणात घडवलेल्या आहेत म्हणूनच त्याचे नाव काळा राम असे पडले. ह्या मूर्ती गोदावरीच्या पात्रात सापडल्या अशी आख्यायिका आहे.
ह्या मंदिराजवळच आणखी एक लहान मंदिर आहे. इ.स.१७८२ मध्ये माधवराव पेशवे यांचे वकील देवराव हिंगणे यांनी बांधलेले हे मंदिर गोरा राम अथवा गोरे राम मंदिर ह्या नावाने ओळखले जाते. या मंदिराचे बांधकाम पूर्णपणे शिसवी लाकडाचे आहे.
सीता गुंफा ही एक लहानशी गुहा असून रामायण काळात रावणाने सीतामाईचे हरण ह्याच जागेतून केले असा समज आहे. ह्या गुहेत रामायणातील प्रसंग चित्रित केलेले आहेत.
नारोशंकरी घंटा ही पोर्तुगीज बनावटीची वसई चर्च मधील घंटा. वसईवरील विजयानंतर चिमाजी अप्पा पेशव्यानी ती काढून घेतली आणि हत्तीवरुन वाजत गाजत ती नाशिकला आणली. (ही घंटा वाई जवळ मेणवली येथे आहे असेही सांगितले जाते. अशा एकूण तीन घंटा आहेत असे म्हणतात. तिसरी कुठे आहे माहीत नाही)
पेशव्यांचे सरदार नारोशंकर राजेबहाद्दर यांना त्यांच्या लढाईतील पराक्रमाबद्दल पेशव्यांनी ती घंटा भेट म्हणून दिली. मग राजेबहाद्दर यांनी एक शिवमंदिर बांधले आणि प्रवेशद्वारावर ती घंटा तिथे बसवली. सहा फूट व्यासाच्या ह्या घंटेचा आवाज 5 किमी. अंतरावरही ऐकू येतो असे म्हणतात.
(ही सर्व माहिती गूगल वरून संकलित केली आहे)
ह्या घंटेने मराठी भाषेला एक अलंकार बहाल केला. अतिशय उच्च स्वरात बोलणार्या स्त्रीला 'नारोशंकरी घंटा' अशी उपमा दिली जाते.
जुन्या आग्रा मुंबई रस्त्यावर कालिका मातेचे मंदिर आहे. नवरात्रामधे इथे मोठी जत्रा भरते. सकाळ संध्याकाळ तिथे दर्शनाला खूप गर्दी असायची. एरवी वर्षभर तिथे कुणी जात नव्हते. तेव्हां तिथे फारशी वस्ती नव्हती. ते मंदिर अगदी लहानसे, काहिसे विजनवासातच होते. आता मात्र त्याच्या आसपास खूप वस्ती झाली आहे. मंदिर सुद्धा मोठे झाले आहे. दसर्याच्या दिवशी गोल्फ क्लबच्या मैदानावर रावण दहनाचा कार्यक्रम असे. दहातोंडी रावणाचा पन्नास फूट उंचीचा पुतळा करुन त्याच्या पोटात फटाके भरले जायचे. एका रथातून श्रीराम आणि लक्ष्मणाचा वेष घेतलेली मुले तिथे यायची आणि एक पेटता बाण रावणावर सोडायची. धडधडून पेटणारा रावण बघायला अवघे नाशिक तिथे लोटत असे. 
 नारोशंकर मंदिराच्या तटावर चारही बाजूला वैशिष्ट्यपूर्ण घुमट आहेत, यांचे छत सुबक अर्धगोलाकार असून महाराष्ट्रात अपवादानेच असे घुमट आढळून येतात, नासिकच्या जुन्या स्थापत्त्याची ही वेगळी ओळख सांगणारे हे काम आहे.
 
 नारोशंकर मंदिराच्या मंडपातील देवकोष्टकात ही चिन्हे कोरली आहेत, त्याचा मला अर्थबोध झाला नाही
 
 नारोशंकर मंदिराच्या गर्भगृहातील द्वार शाखेवरचे नाजूक नक्क्षीकाम. उत्तर मराठाकालिन सुबत शिल्पकलेची साक्ष देणारे
 
 अश्व आणि खांबाची सुबक नक्क्षी
 
 मराठा राजवटीतल्या वैभवशाली व स्थैच्या काळात शिल्प कला उत्कर्षावर होती याचे निदर्शक असलेला हा स्तंभ
 
 पणती पौर्णिमेला नारोशंकर मंदिराचा दिव्यांनी उजळलेला शिल्पांकीत मंडप
 
 
 
 
 श्री नारोशंकर स्थापित श्री रामेश्वर मंदिराच्या भिंतीवरील, शिवशंकराचे काळावर नियंत्रण दर्शविणारे,
"अक्षय नाग शिल्प" 🙏

  कुशावर्त तीर्थ

 कुशावर्त तीर्थ, त्र्यंबकेश्वर.



 
 
 मुरलीधर मंदिराच्या कोठा समोरचा नदी परिसर
 
 दुतोंड्या मारूती समोरचे कुंड दिव्यांनी उजळून निघालेले
 
 ऋणमुक्तेश्वर: अलिकडच्या काळात दरवर्षी काही तरी संकल्पना घेऊन मानकर्यांच्या वतिने सजावट केली जाते..
 
द्वारशाखेचे देखणे नक्षीकाम, वरच्या बाजूला मुख्यस्थानी अतिशय सुबक अशी गणेश मुर्ती
 
 मत्स्यावतार
 
 पुरातन/ऐतिहासिक बारव (पायविहीर)
ब्रह्मगिरी शिखर

नाशिक मधील ब्रह्मगिरी शिखर हे संपूर्ण भारतातील भाविक-भक्त, यात्रेकरू, साधू-संत यांच्यासाठी एक पवित्र ठिकाणं आहे, शिखराच्या पायथ्यापासून ते उंच टोकापर्यंत अनेक प्राचीन कलेची,दैवशिल्पकलेची आणि वास्तूरचनेची एक रांगच पहायला मिळते, श्री त्र्यंबकेश्वर मंदिरापासून ते शिवजटास्थानापर्यंत प्रत्येक टप्प्यात एक-एक आगळ्यावेगळ्या वास्तू आपल्या पूर्वजांनी अगदी काटेकोरपणे निर्माण करून ठेवल्या आहेत, आणि प्रत्येकाचं आपलं एक वेगळं महत्व आणि आपल्यासाठी त्यांचं दर्शन म्हणजे,प्राचीन इतिहासाची सोबत आणि आपल्यासारख्या सामान्य माणसाला त्यांचा दैव साक्षात्कार घडल्या सारखेच आहे,यातल्या काही वास्तू आज निटनेटक्या व जशाच्या-तशा आहेत, मात्र काही वास्तू जमीनदोस्त झाल्या आहेत किंवा चौथरे, नुसत्या भिंती तेवढ्या उभ्या आहेत,प्राचीन राजवाडे तर पूर्णपणे नामशेष झाले आहेत, जे गर्द झाडीत अजूनही लपलेले आहेत,यां शिखराचं अजून एक आश्चर्य म्हणजे येथील. अनेक गुहा काही निसर्गनिर्मित तर काही मानवनिर्मित, काहींपर्यंत पोहचता येतं,पण काहींपर्यंत पोहचणं अवघडचं नाही तर अशक्यसुद्धा आहे,पूर्वी याच गुहांमध्ये साधू-संत, नवनाथ, गौतम ऋषी यांनी अनेक काळ साधना केली वं त्यातील काही देव इथूनच पुढील कार्यासाठी अंतर्धान झाले,यातील एक गुहा गहिनीनाथ,निवृत्तीनाथ, तर एक गुहा गौतम ऋषींची आहे,

शिखराच्या माचीवर पोहचल्यावर गंगाद्वारकडे जाणाऱ्या मार्गावर (एक मार्ग गंगाद्वारकडे दुसरा मार्ग शिखराकडे जातो), एक प्राचीन धर्मशाळा आहे, यां धर्मशाळेच्या थोडे पुढे गेल्यावर,गर्द झाडीत एक भूमिगत प्राचीन नजराणा
स्थित आहे, चहूबाजूने अत्यंत थंडगार, शांतता आणि प्रचंड एकांततेच्या ठिकाणी एक भव्य बाव, बारव स्थित आहे,शिखर सर करतेवेळी प्रत्येक मानव, पशु-पक्षी,
किंवा इतर कुणालाही या बारवेच्या पाण्याने आपली तहान भगवता येईल,यासाठी थेट पाण्यापर्यंत पोहचण्यासाठी कित्येक पायऱ्या आहेतं,या पायऱ्यांमुळेचं तिला पायविहीर म्हणतात, कुणाचीहीं मदत न घेता, ना दोर-बादली वापरता, येथील थंडगार पाण्याचा आस्वाद घेता येतो,
आज मात्र हे हिरवेगार पाणी पिण्यास योग्य नाही,
पावसाळ्यात मात्र येथील पाणी काचेसारखं शुद्ध असतं,
आणि हीं बारवही काठकाठ भरून येते,
भक्कम बांधकाम, लांबलचक विस्तार आणि निर्माण केलेल्या अनेक पायऱ्या,यामुळे हीं बारव कायमस्वरूपी स्मरणात राहून जाते, पुरातन काळात येथील वास्तूंचे अधिक महत्व होते,माचीवर मानवी सहवास होता, पण जस-जसा काळ बदलला, तसे हे ठिकाणं निर्मनुष्य झाले, आणि अनेक काळ हा परिसर दुर्लक्षित आणि ओस पडला,त्यामुळे त्यांची दुरावस्था झाली, बारवेचा काही भाग ढासळलेला आहे,शिखरावरील पवित्र ठिकाणे, कातळजिने, दरवाजे सोडले तर इतर वास्तू याच परिस्थितीतं आहेत,मात्र संपूर्ण मार्गात हुल्लड व निष्काळजी पर्यटकांनी फारच कचरा करून ठेवलेला आहे, आणि यामुळेच शिखराचं पावित्र्य धोक्यात येतं,
अशुद्ध ठिकाणी दैवहीं वास करतं नाही,
प्रत्येकाला आपापली जबाबदारी कळायला हवी.

(ब्रह्मगिरी शिखराचा अभ्यास करतेवेळी,येथील काही ठिकाणं आजही सामान्य माणसापासून गूढ-गुपितचं आहेत)

ब्रह्मगिरी शिखर आपल्या नाशिक जिल्ह्याला लाभलेला
अति पवित्र नगीना आणि पाषानी खजिन्यातला मौल्यवान हिरा आहे,त्याचे रक्षण आपलं प्रत्येकाचं प्रथम कर्तव्य.
 
  अंजनी माता मंदिर 🙏
अंजनेरी पर्वत

शिव तपश्चर्या,ध्यान-साधना मुख्य मंदिर.
 पेशवे सरदार नारोशंकर स्थापित श्री रामेश्वर मंदिराच्या भिंतीवरील आगळे-वेगळे सप्तश्रुंगी देवीचे प्राचीन शिल्प.
 
 सुंदर नारायण भगवान
 कपालेश्वर हरीहर रूप
 
पंचवटी नाशिक
 
 श्री त्यागेश्वर शिवमंदिर
गोदाघाट,पंचवटी-नाशिक
 
 रामकुंड परिसरातील,गोदावरीच्या काठावर,
वसलेलं पुरातन श्री निळकंठेश्वर शिवमंदिर.





 ही आपल्या नाशिकची ग्रामदेवता सांडव्यावरची देवी!अनेकांचे श्रद्धास्थान !साक्षात नांदुरी गडावरील आदिमाया,आदिशक्ती सप्तशृंगी देवीचे प्रतिरूप!पुज्यपावन गोदावरीच्या तीरी अनेक वर्षांपासून पूर्वाभिमुख होउन भव्यदिव्य रूपाने स्थित आहे.चैत्रशुद्ध पौर्णिमेला तिची तेजपुंज कांती,प्रसन्न मंगल मुखकमल,शस्त्र, आयुध, चांदीसोन्याची विविध आभूषणे,भरजरी वस्त्रप्रावरणे,फुलांचे सुशोभित हार चेहऱ्यावरचे मोहक हास्य ,विशाल पाणीदार नेत्र असे मनोहारी रूप दर्शन घेणाऱ्यांना भारून टाकतात .एक आगळेवेगळे समाधान लाभते.रात्री पौर्णिमेच्या स्वच्छ प्रकाशात या देवीपुढे नतमस्तक होणे ही तर आत्मिक सुखाची परमावधी!
भगवती आदिमाया आदीशक्ती आई अंबाबाईचा नवरात्र महोत्सव तसेच चैत्र शुद्ध पौर्णिमेचा उत्सव ठिकठिकाणी भक्तीभावपूर्वक, उत्साहवर्धक व प्रसन्नचित्त अशा मंगलमय वातावरणात साजरा होत असतो. या विश्वस्वामीनीची पृथ्वीतलावरील लहान मोठी प्रसिद्ध अप्रसिद्ध सुगम दुर्गम ठिकाणची सगळ्या प्रकारची मंदिर नयनरम्य सजावटीने चैतन्यमय प्रकाशात उजळून निघतात. भक्तीरंगात रंगून जातात.सगळ्या देवांच्या तेजाचा अंश असलेली दुराचाऱ्यांच्या पारिपत्यासाठी प्रकटलेली ही दिव्यशक्ती तशीच महान व थोर आहे. प्रत्येक भक्त अनन्यपूर्वक भावनेने या विश्वजननीला "आई" या शब्दाने साद घालतो. तिच्या स्तुतीसुमनांनी भारावलेली स्तोत्रे प्रार्थना गाणी व आरत्या यात आई, माँ या शब्दांचा समावेश असतो.कारण "आई" या दोन अक्षरात साऱ्या श्रुती व स्मृती सामावलेल्या आहेत. प्रेमाचा सागर वात्सल्यतेचे आगर फुलांची कोमलता व गंगेची पवित्रता आणि पराक्रमाची योजक्ता तेजोमयता शस्त्र अस्त्रांची सिद्धता व अंगाराची मूर्तीमंतता अशी सारी गुण वैशिष्ट्ये भगवतीच्या ठाई सामावलेली आहे. ही माय भवानी जगदंबा भक्तांचे सुखसदन प्रेमाचे माहेर भक्तीचे जिव्हार व मंगलतेचे आगर विरतेचा सागर आहे. म्हणूनच
!!या देवी सर्व भुतेषु: मातृरुपेनं संस्थिता!!
असे आई भवानीला आम्ही विनवितो.
 मकर मुख" उर्फ "मकर प्रणाल"

यां शिल्पाला "मकर" असे म्हणतात, "मकर" म्हणजे "मगर"
देवी नर्मदा (गंगा) जेव्हा पृथ्वीवर अवतीर्ण झाली,
तेव्हा तीचे मुख्य वाहन "मगर" होते,
शिवाच्या पिंडीवरून वाहत जाणारे पाणी या
मकराच्या तोंडातून बाहेर पडते,
तेव्हा त्यास "मकरवाहिनी" संबोधले जाते,
मकराचं वैशिष्ट्य त्याने मंदिराचा सर्व भार,आपल्या पाठीवर घेतलेला असतो,ज्या दिवशी मकर उधवस्त होईल, त्या दिवशी मंदिरही उध्वस्त होईल किंवा तेथील दैवत्व लोप पावेल,असे भाकीत वर्तवण्यात येतं.
"मकर" हा कीर्तीमुख,कळस,घंटा,नंदी,भगवा झेंडा याप्रमाणेच दैवत्व निर्माण करणारा मुख्य घटक आहे.
जलाभिषेका दरम्यान आपल्या चुका,पापं,पश्चाताप या मकराच्या तोंडातून बाहेर वाहत जातात.
🙏 श्री गोंदेश्वर मंदिराबाहेरील भव्य
मकरमुख उर्फ मकर प्रणाल 🙏
सिन्नर जि.नाशिक










 सिन्नरचं ऐतिहासिक वैभव
🙏 श्री गोंदेश्वर शिवमंदिर 🙏
मुख मंदिर शिल्पाभ्यास.
























 
 रामकुंड, गोदातीर्थ, पंचवटी-नाशिक

सूर्यस्नान व पवित्र जलतीर्थ

नाशिक म्हणजे देवदेवतांची भूमी तर पंचवटी नाशिकमधलं अतिपवित्र स्थान, स्वर्गातला प्रत्येक देव जिथे विसावला ते पंचवटी क्षेत्र, त्यामुळे नाशिक शहराची ख्याती संपूर्ण भारतभर पसरली आहे.
नाशिकचा उल्लेख सर्वप्रथम स्कंदपुराणात केला गेला, नाशिक हे स्थान पापकर्मातून सुटण्याची पहिली पायरी असेल, असे म्हटले जाते, म्हणूनच तर इथे अनेक काळापासून पदयात्रा, तीर्थयात्रा केल्या जातात,पंचवटी हे श्री रामांच्या पदस्पर्शाने पवित्र झालेले स्थान आहे, श्री रामांनी आपल्या पित्याचे,दशरथ राजाचे "अस्थी विसर्जन" याच कुंडात केले होते,तेव्हापासून इथे प्रत्येक मनुष्याचे अस्थी विसर्जन केले जाते, हिंदू धर्मानुसार प्रत्येक मनुष्य प्राण्याने या पवित्र जलकुंडात स्नान केल्यास त्याचे रोग, व्याधी दूर होतात, तसेच आत्मग्लानी, आत्मभोग,चुका, अपशब्द,पश्चाताप यापासून मुक्तता मिळवण्यासाठीचे हे स्थान आहे, या कुंडात सूर्यस्नानाला फार महत्व आहे, उगवत्या सूर्यासोबत,तसेच मावळत्या सूर्याला साक्षी मानून स्नान करणे म्हणजे, जीवन-मरणाच्या मधील यातना, दुख, पीडा, अडचणी, निराशा सोडवण्यास तो मदत करतो,
आणि जीवनात सुख, समृद्धी, आनंद आणतो,
पवित्र रामकुंड फक्त शरीराची नाही तर,आत्म्याची शुद्धी करतं,तसे ते पापातून मुक्तता मिळवण्यासाठीचे ही मुख्य स्थान आहे,
पौराणिक अख्यायिका:-
समुद्रमंथनाच्या वेळी अमृत कलश उत्पन्न झाला,देव-असुर यांच्याचं सर्वात आधी अमृत कोणाला मिळेल, यावरून वर्चस्व निर्माण झाले आणि त्याच गडबडीत कलशातुन अमृताचे काही थेंब ह्या ठिकाणी पडले, तेव्हापासून रामकुंडाचे पाणी अधिक पवित्र झाले, रामकुंड म्हणजे
श्री रामांनी 13 वर्षे जिथे वास्तव्य केले, ज्या कुंडात त्यांनी दररोज स्नान केले, श्री रामांनी निर्माण केलेले जलकुंड अर्थातच "रामकुंड".
श्रीराम म्हणजे जीवनाचा बोध सांगणारे, कर्तव्याचे,पालन करणारे त्यामुळेच जीवनाची सुरुवात जर राम असेल, तर मरतेसमयी मनुष्यदेह,हा रामात मिसळला जावा अशी जण-माणसात परंपरा आहे,श्रीरामांनी रावणाचा वध केला,
आणि रावणही शेवटी रामात मिसळून गेला, यानुसारच प्रत्येक मनुष्य शेवटी-शेवटी रामात मिसळला जातो,
मरतेसमयी राम नाव उच्चारूनचं देहाला शांती, संस्कार
दिले जातात, रामकुंडाच्या एका बाजूला अस्थी विसर्जन कुंड आहे,मनुष्य मृत झाला की, त्याची राख (अस्थी) त्या कुंडात वाहिली जाते, जेणेकरून त्या मृतात्म्याला मोक्ष मिळू शकेल, त्यामुळेच आयुष्याच्या सरतेशेवटी मनुष्य देह श्री रामांना अर्पित केला जातो, आत्म्याची परमात्म्याशी भेट म्हणजे रामकुंड होय,जिवंतपणी केलेल्या पापकर्मातून तर मृत्यूनंतर होणाऱ्या पाप-पुण्याच्या हिशोबातून मनुष्य सुटतो आणि दुसऱ्या जन्माच्या वाटचालीकडे तो इथून चालू लागतो, काही पुण्य आत्म्यांना इथून स्वर्गाची प्राप्ती होते,आणि त्याच पाप-पुण्याचा हिशोब सांगणारे हे पृथ्वीवरील पाप-पुण्य कुंड होय.
पवित्र गोदामाई आपले जलतीर्थ यां कुंडात निरंतर प्रवाहित करतं राहते, रामकुंड घाटाचे निर्माण 1996 साली करण्यात आले, रामकुंडाच्या वायव्येला अरुणा संगम , मागे सीताकुंड उर्फ अहिल्याकुंड, दक्षिणेला दुतोंड्या मारुती, हनुमान कुंड, दशाश्वामेध कुंड आहे, तर नारोशंकराच्या मंदिरासमोर रामगया कुंड आहे,
नाशिक म्हणजे प्रभू श्री रामांच्या पाऊलखुणा आणि वास्तव्याचे ठिकाण,त्यामुळे गर्व, मी पणा, अहंकार, ईर्षा, मोह, स्वार्थ यांचे हरन करणारे, तर इच्छा, पश्चाताप, प्रायश्चित्त, पापकर्म, त्याग याचे निवारण करणारे ईश्वर
आणि या सगळ्यांशी जोडला गेलेला मनुष्य.
जिथे मनुष्य आणि परमेश्वर एकत्रित येतो ते स्थान अधिक प्रिय आणि पवित्र वाटू लागते.
रामकुंडाशी एकनिष्ठ

 
अपरिचित इतिहास आणि वास्तू
" पुण्यश्लोक अहिल्यादेवी टोपबावडी "
'कसारा घाट' जि.नाशिक

नाशिकहून मुंबईला जातांना,कसारा घाटाच्या उजव्या बाजूला एका वळणावर,ही गोलाकार,घुमटाकृती वास्तू दिसून येते, उलट्या टोपलीच्या आकाराची,अर्धवर्तुळाकार इग्लुच्या आकाराची घुमटासमान,ही प्राचीन विहीर (बाव) आहे,पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यानी, या घाटातून येणाऱ्या-जाणाऱ्या प्रवासी, यात्रेकरू वाटसरुंना पिण्याच्या पाण्याची सोय व्हावी,म्हणून या विहिरीचे निर्माण केले,मुख्य रस्त्यावरून 50 फूट चालत गेल्यावर, आपण या विहिरीपर्यंत पोहचतो, संपूर्ण दगडी बांधकाम कलात्मक आहे, तसेच झाडे, पालापाचोळा, जंगली प्राणी या विहिरीत पडू नये, तसेच उन्हाळ्यात विहिरीतील पाण्याचे 'बाष्पीभवन' होऊ नये, म्हणून या विहिरीवर गोल घुमट बांधलेले आहे,या विहिरीत उतरण्यासाठी पायऱ्या नाहीत तर,पाणी काढण्यासाठी तिन्ही बाजूला तीन अर्धगोलाकार खिडक्या केलेल्या आहेत,दगडी शिळा एकमेकांवर ठेवून,एखाद्या महालाच्या घुमटासमान हे छत्र बनवल्यामुळे,विहिरीच्या सौंदर्यात अधिकच भर पडली आहे, स्थानिक या विहिरीला 'अहिल्यादेवी होळकर विहीर' म्हणून ओळखतात,
ही विहीर 250 वर्षे जुनी आहे,इतकी वर्षे उलटूनसुद्धा आजही सुस्थितीत आणि वापरात आहे आणि उंचावर असूनही 12 ही महिने तिला भरपूर पाणी असते,
प्राचीन काळात दुष्काळाचा अभाव लक्षात घेता,पाण्याच्या विविध सोयी-सुविधा केलेल्या आढळतात, परंतु अशा प्रकारच्या विहिरी दुर्मिळचं.
राजमाता अहिल्यादेवी यांना खूप-खूप धन्यवाद

 
 
"वसई विजयाची डंका"⚔️
प्रसिद्ध नारोशंकरांची घंटा 🔔
पंचवटी, नाशिक

श्री रामेश्वर आणि श्री भीमाशंकर येथील
भव्य घंटा.

"सरदार नारोशंकर" यांनी पेशवे "सेनापती चिमाजी अप्पा" यांच्या नेतृत्वाखाली,वसई युद्धात मोलाचे कार्य केले होते,
पोर्तुगीजांविरुद्ध पेशव्यांचा पराक्रम आणि विजयाचे प्रतीक म्हणून तिथल्या चर्चच्या 3-4 भव्य घंटा त्यांनी हत्तीवर लादून आणल्या होत्या (हत्तीच्या गळ्यात टांगून,बांधून आणल्या होत्या), परंतु या घंटा एवढ्या भव्य होत्या, की त्या लांबपर्यंत घेऊन जाणं कठीण होतं, त्यामुळे. पेशव्यांनी त्या वेगवेगळ्या ठिकाणी स्थलांतरीत केल्या,
त्यापैकी एक घंटा श्री भीमाशंकर मंदिर परिसरात ठेवण्यात आली, दुसरी थेट नाशिक इथे आणण्यात आली,
(सन-1739 सालचे वसईचे युद्ध), त्यानंतर ही घंटा बेवारस,अशीच पडून होती,परंतु ती कास्य धातूपासून बनलेली असल्याने सुरक्षित होती, सरदार नारोशंकर जेवढे पराक्रमी, शूरवीर सैनिक होते, तेवढेच ते देवाला मानणारे, देवपूजा करणारे होते, त्यामुळे त्यांनी युद्धासमयी वेगवेगळ्या प्रदेशांना भेटी दरम्यान अनेक पुरातन मंदिराचा अभ्यास केला होता,त्यातून बोध घेत त्यांनी सन-1745 साली श्री रामेश्वर मंदिराचे निर्माण केले सन-1747 पर्यंत मंदिराचे बांधकाम पूर्ण झाले, परंतु मंदिराची सुरक्षा महत्वाची होती,याकारणे मंदिराला चहूबाजूने भक्कम भिंत बांधण्यात आली व राजपूत कारागीरांनी चार पावसाळी छत्र्या सुद्धा निर्माण केल्या,घंटेसाठी दर्शनी विशिष्ट उंच जागा निवडण्यात आली,एका हाताने ह्या घंटेचा लोलक हलतही नाही,आणि देवाचे दर्शन घेण्याआधीचं प्रत्येक सामान्य माणसाने आपले शक्तीप्रदर्शन दाखवू नये,यामुळेच कदाचित ती एवढ्या उंचावर लटकवण्यात आली,त्या काळापासून ते आजपर्यंत ही घंटा गोदावरीला येणाऱ्या पुराचं संकेत देते, असं म्हटलं जातं, आणि ते खरे आहे, यां दोन्ही घंटांवर 1727 असे कोरलेले आहे, कदाचित त्या सन-1727 मध्ये निर्माण केलेल्या असाव्यात,
आज या दोन्ही घंटा वाजण्यास प्रतिबंध आहे, प्रमुख कारणं हे की,त्यांचा आवाज खूप कर्कश आहे, कानात खूप वेळ घोंगवणारा,अक्षरशः बहिरे करणारा आवाज आहे, त्याकाळी गोदावरीला पूर आल्यानंतर ही घंटा वाजली जातं असेल, म्हणजे सगळ्यांना कळेल की गोदावरीला पुर आला, याचा फक्त आज अंदाज लावता येईल,
या दोन्ही घंटांचा लोलक काढून ठेवण्यात आला आहे,
आणि असे अनेक मंदिरे आहेत जिथे लहान-लहान घंटा सुद्धा बांधून ठेवण्यात आल्या आहेत,धार्मिक आणि वैज्ञानिक दृष्ट्या देवाची प्रार्थना करण्याआधी, आपण मंदिरातील घंटा वाजतो, मगच आत प्रवेश करतो, घंटेतुन होणारा नाद,हा तीव्र नसून,शांत असा स्वर असतो,जो थोडा वेळ कानात घुमणारा, मनावर आणि परमेश्वराच्या कानावर एक सूचनेचा प्रकाश टाकतो,(देव झोपलेला नसतो,फक्त त्यातून देवाला सूचित केले जाते,असे आपण ग्राह्य धरतो), घंटा वाजल्याने मनं विचलित होते असे काहींचे म्हणणे आहे, तर ते पूर्णपणे खरे नाही, घंटा ही नकारात्मक ऊर्जा दूर करून, सकारात्मकता, एकाग्रता, शांतता उत्पन्न करते, थोडा वेळ देवाची प्रार्थना करण्यासाठी मनात मग्न भाव आणते,असं विज्ञान सांगत,
घंटानाद म्हणजे शुभकार्याची सुरुवात, घंटानाद म्हणजे संकटासमयी इशारा देणारे साधनं, काळ,वेळ मात्र वेगवेगळा,मंदिरातील घंटा बांधून ठेवणे, लोलक काढून ठेवणे हे अपशकून, संकट,नकारात्मक येण्याची निशाणी आहे, शिवाय पवित्रता ही लोप पावते, मंदिराला जसा कळस महत्वाचा,तशी घंटा सुद्धा महत्वाची,
(पूर्वी ही घंटा ज्या चर्चमध्ये होती,तेव्हा ती मोकळा श्वास घेत होती, आज मात्र ती बंधनात आहे)
श्री रामेश्वर मंदिरातील नारोशंकरांची घंटा,दिवसातून दोन वेळा,ठराविक वेळेला वाजवली,तर एक छान उपक्रम होईल, शिवाय तिचे महत्व खूप आहे, पण ते प्रत्येकाला समजेलच असे नाही.
आज एका पुरातन मंदिरात,लोलक बांधलेली घंटा पहिली
आणि श्री नारोशंकरांच्या घंटेची आठवण आली
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 भद्रकाली मंदिर

 भद्रकाली माता मुर्ती
 

 
 
 
 
नाशिकची सांडव्यावरची देवी*
सप्तशृंगगडावरची देवी थेट नाशिकला (गोदावरीत) कशी आली याचीही एक आख्यायिका सांगितली जाते. हल्लीच्या राजेबहाद्दर यांचे पूर्वज नारोशंकर राजेबहाद्दर हे सप्तशृंगनिवासिनी देवीचे निस्सिम भक्त. दर पौर्णिमेला ते घोड्यावरून गडावर देवीच्या दर्शनाला जात असत. पुढे वयोमानानुसार त्यांना दर पौर्णिमेला गडावर जाणे कठीण वाटू लागले. आपल्याला आता देवीचे दर्शन नियमितपणे घेता येणार नाही याची त्यांना खंत वाटू लागली, तेव्हा त्यांनी देवीची प्रार्थना केली. देवीसाठी अनुष्ठान केले. त्यावेळी देवीने त्यांना दृष्टांत दिला, ‘ठीक आहे. मी तुझ्यासोबत तुझ्या घरी येईन. मात्र, माझी एक अट आहे. तू मागे वळून पाहू नकोस. जर तू मागे वळून पहिले, तर मी आहे त्याच ठिकाणी थांबेन.’ नारोशंकरांनी देवीची अट मान्य केली. ते पुढे आणि त्यांच्या मागे देवी निघाले. गडापासून पंचवटीत येईपर्यंत नारोशंकरांनी मागे वळून पहिले नाही. मात्र, पंचवटीत येताच त्यांच्या मनात शंका आली. देवीने आपल्याला फसविले तर नाही? त्यामुळे त्यांनी मागे वळून पहिले. साक्षात सप्तशृंगनिवासिनी त्यांच्या समोर उभी होती. ती म्हणाली, ‘मुला, तुझ्या मनांत शंका आली. आता मी येथेच थांबते.’ आणि ती तिथेच अदृश्य झाली. देवी ज्या ठिकाणी गुप्त झाली त्याच जागेवर नारोशंकर राजेबहाद्दरांनी मंदिर बांधले, तेच हे सप्तशृंगनिवसिनीचे सांडव्यावरील देवी मंदिर. सुमारे २५० वर्षांपूर्वीची ही गोष्ट आहे. आज नारोशंकरांची दहावी पिढी सांडव्यावरील देवीची नित्यनियमाने पूजा करते. तिचा चैत्रोत्सव व नवरात्रोत्सव मोठ्या उत्साहाने आणि श्रद्धेने साजरा केला जातो.
नारोशंकर राजेबहाद्दर यांचे दहाव्या पिढीतील वंशज
१. सदाशिव त्र्यंबक राजेबहाद्दर
२. चंद्रकांत त्र्यंबक राजेबहाद्दर
३. निशिकांत त्र्यंबक राजेबहाद्दर
४. मधुसूदन त्र्यंबक राजेबहाद्दर
देवीचे वार्षिक उत्सव आणि देखभाल वर्षभरासाठी एकेका भावाकडे आळीपाळीने दिले जातात. यावर्षी देवीचा नवरात्रोत्सव निशिकांत त्र्यंबक राजेबहाद्दर यांच्याकडे आहे

 


 Old Victoria Bridge


 
 
 Deolali Camp  Vishvamber store i guess 



 रविवार कारंजा चा जुना फोटो
 
 मुख्य दाजिबा,जानोरी गाव*
या वीर दाजिबा बद्दल कदाचित तुम्हाला माहिती नसेल……
तुम्ही वीर दाजिबांची कथा ऐकलीच असेल ही कथा जानोरी गावातिल एका गवळ्याची आहे तेच आपले वीर दाजिबा महाराज….
वीर दाजिबांचे मंदिर हे दिंडोरी येथील ढकांबे गावच्या पुढे तळोदा (तळे गाव) येथे आहे….
वीर दाजिबा हे जानोरी गावचे रहिवासी असल्या मुळे ही प्रथा जानोरी गावातील आहे…
नाशिक शहरात एकूण तीन दाजिबा वीर आहेत त्यातील प्रमुख हे जानोरी या मूळ गावी आहे तर नाशिक शहरातील बाकी दोन दाजिबा हे पाहुणे म्हणून आणि नवसाचे आहे…..
जानोरी गावातील दाजिबा मिरवण्याचा मान हा नाशिक शहरातील जुने नाशिक येथील *भागवत* कुटुंबियांना असतो
आजही धुलीवंदनाच्या दिवशी दाजिबा महाराजांची पारंपारिक पद्धतीने मिरवणूक ओझर जवळील जानोरी गाव येथे निघते.
दाजीबा मिरवणुकीची आख्यायिका....
      नाशिक जवळच असलेल्या दिंडोरी तालुल्यातील जानोरी गावात एक गवळी राहात होता. खंडेराव आद्यदैवत असल्याने गवळी खंडेरायाची निस्सीम भक्ती करत होता. गावात दूध घालून झाल्यावर केवळ ईश्‍वरसेवेत आपला वेळ घालवणे असा त्याचा नित्यक्रम होता. वयाच्या 16 व्या वर्षी लग्न ठरते आणि अंगाला हळद लागल्यानंतर दुसर्‍या दिवशी कर्म हीच सेवा म्हणत हा गवळी दूध घालण्यासाठी कावड आणि कुत्र्यासह निघतो. वाटेतच अज्ञाताकडून या गवळ्यावर हल्ला होतो आणि या हल्ल्यात गवळ्याचे निधन होते. त्यावेळी दु:खी झालेले कुटुंबीय घरी परतत असताना गावात वाद्ये वाजण्यास सुरूवात होते. ज्याठिकाणी गवळी खंडेरायाची पूजा करीत असे त्याठिकाणी त्यांची प्रतिमा दिसू लागली आणि ती बोलूदेखील लागली. यावेळी जो कोणी माझी राहिलेली इच्छा पूर्ण करतील त्यांची मी इच्छा पूर्ण करेल, अशी आख्यायिका सांगितली जाते.
'बाशिंगे वीर' आणि 'दाजीबा वीर'
           नाशिक शहराला परंपरा लाभलेल्या वीरांची मिरवणूक आज विविध भागांतून निघणार असून, ज्यांच्या घरात वीरांचे टाक आहेत. या आख्यायिकेनुसार हळदीचा नवरदेव बाशिंग लावून दरवर्षी उपवर पत्नीच्या शोधात फिरत असतो. लग्न मंडपात गेल्यावर दाजी म्हणून त्यांना 'दाजीबा वीर' तर हळद लावल्यावर बाशिंगे लावून मिरवतात म्हणून 'बाशिंगे वीर' असा प्रघात आहे. या बाशिंगे वीराची समाधी दिंडोरी येथील तळोदा येथे असून होळीच्या दिवशी याठिकाणी रात्री पूजा केली जात असल्याची आख्यायिका आहे. हा दिवस फाल्गुन वद्य प्रतिपदेचा असल्याने या दिवसापासून 'दाजिबा वीराची'* मिरवणूक काढण्याची प्रथा सुरू आहे.


 ब्रिटिशकालिन त्रिरश्मी लेनी नाशिक
 
 नाशिक मधली धुळवड
नाशिक मध्ये होळी पौर्णिमेच्या दुसऱ्या दिवशी सकाळी धुळवड किंवा धुलीवंदन साजरे केले जाते.
होळी नंतर वेगवेगळे 3 सण लागोपाठ आगळ्या वेगळ्या पद्धतीने साजरे करणारे नाशिक हे एकमेव असावे.
धुळवडीच्या दिवशी सकाळी सकाळी आम्ही बच्चे कंपनी जुने कपडे घालून विना आंघोळीचेच गल्लीतल्या होळी भोवती जमायचो.आदल्या दिवशीच्या होलिका दहणाची राख गोळा करून त्यात थोडे पाणी मिसळायचे, एक छोटा खडा घेऊन राखेचे चेंडू एव्हडे गोळे बनवायचो,हेच आमचे हॅन्ड ग्रेनेडच जणू.
मग आमच्या वानर सेनेची लढाई सुरु व्हायची ती इतर गल्लीतल्या मुलांशी.नुसती एकमेकांवर गोळाबारी चालायची.













काही मुले एकमेकांच्या अंगावर फक्त राखच उधळायचे.
त्या गरम राखेत पाणी मिसळले की एक आगळाच सुगंध यायचा, तो सुगंध अजूनही डोक्यात फिट्ट बसलेला आहे.
राखे बरोबरच काही मुले वाड्यातल्या कोनाड्यातून, अगदी सार्वजनिक संडासच्या कोणाड्यातूनही रॉकेलच्या दिव्यांची काजळी काढून आणत आणि ती इतरांना फासत.
त्या वेळी नेहरुचौकात पांजरापोळाचे दुधविक्री केंद्र होते,त्याची बैलगाडी आमच्या सोमवार पेठेत पार्किंग ला असायची. त्या बैलगाडीच्या चाकांचे वंगण (ग्रीस) काढूनही एकमेकांचे चेहरे रंगवले जात.
एकूणच त्यावेळची धुळवड म्हणजे ब्लॅक अँड व्हाइटच होती,आजच्या सारखी इस्टमन कलर नव्हती.
दुपारी खेळून झाल्यावर होळीत मोठी लाकडे पेटवली जात आणि त्यावरच पाणी तापवून अंघोळ करून,धुळवडीची सांगता होत असे
आता ती धुळवड कधीच संपली आहे.काही दिवसांनी ही प्रथा बंदच होईल कदाचित.
©
विकास जाधव
नाशिक
9767884931

नाशिकमधील रहाडी








 


 The very famous
Pandav leni
 
 १९०१ सालचा नाशिकचा भाजी बाजार.
 A Vegetable Market beside the Godavari River in the Pilgrimage Town of Nassik, India. Photograph circa 1901.
“About 95 miles by rail northeast of Bombay, on the Godavari river, we come to the town of Nassick. It is but thirty miles from the source of the river and is a holy place of pilgrimage. The traditional source of the river, the Encyclopedia Britannica tells us, is on the side of a hill behind the village of Trimbak. But popular legend has it that the river proceeds from the same source as the Ganges. Throughout the town of Nassick shrines and temples line the river. The small shrine we see across the Godavari stands close to the water's edge and some of the holy places even stand in the in the river. In the vicinity of Nassick, there are a number of sacred caves. These are ancient Buddhist caves that date from the 3rd century.
Before us is a typical bit of Indian urban life in Nassick. This is the vegetable market. Purchase here is by barter. It is an extremely tedious process but is common to all Oriental countries. It is very unlike our one-price system; but it is a system in which resistance is an economic necessity. At this market you will be able to purchase cabbage, cauliflower, artichokes, beans, cucumbers, pumpkins, lettuce, onions, ginger, beets, melons, and many other familiar fruits and vegetables.
Nassick, which has a population of close to 22,000, manufactures cotton goods and is known for its brass and copper ware.” -Caption by the publisher.
 
१९१४ सालचे नाशिकमधील दृश्य. कुंभारवाडा...

“For in the Nasik Market-place one Day
I snapp’d the Potter thumping his wet clay”

Photograph from Nasik, year 1914 taken by F. H. Fitz Gerald of Bombay. The caption was creative interpretation from the poem (The Rubaiyat of Omar Khayyam) by Omar Khayyam used as caption by F. H. Fitz Gerald

Photo & Caption courtesy - India Historical Moments 
 
 
 नाशिकवृत्त : नाशिकमधले [ बहुधा ] पहिले वृत्तपत्र ”
नाशिक गॅझेटीयर मधल्या नोंदींनुसार १८६४ साली ‘ नाशिक वृत्त ’ नावाचे वर्तमानपत्र चालू झाले. कै. त्र्यंबक हरी काळे हे ते वृत्तपत्र प्रकाशित करीत असत. बहुधा नाशिक मधून प्रकाशित होणारे ते पहिले वृत्तपत्र असावे.
|| जसा मेघ वर्षे जगानंद द्याया || तसे नीतिर्ते तुष्टवो हे जनाया ||
जया नासिकाते असे नाम वृत्त || निघे मंदवारी असो आयुयुक्त ||
अशा काव्यपंक्ती धारण करणारे हे वृत्तपत्र नाशिकवृत्त छापखान्यात छापले जाई आणि दर आठवड्यात शनिवारी संध्याकाळी प्रकाशित होत असे.
लंडनमधल्या ऑक्सफर्ड स्ट्रीटवरच्या प्रोफेसर हॅलोवे यांच्या ग्रंथालयात देखील हे वृत्तपत्र वाचायला मिळू शकेल असे ह्याच्या शीर्षक नोंदींमध्ये नमूद केलेले होते असे वाचायला मिळते आहे.
नाशिकवृत्तची किंमत एका वर्षासाठी आगावू नोंदणी धारकांसाठी दोन रुपये होती तर आगावू नोंदणी न करणाऱ्यांसाठी तीन रुपये होती. म्हणजे एक रुपया ही आगावू नोंदणीसाठी सवलत होती .. सहामाही आगावू एक रुपया आठ आणे, आणि आगावू नोंदणी न करणाऱ्यासाठी दोन रुपये [ म्हणजे आठ आण्याची सवलत !! ] होती. किरकोळीने [ फुटकळ ] अंक घेतल्यास आठ आणे पडत असत.
अंकात छापल्या जाणाऱ्या नोटीसांसाठी पहिल्या दहा ओळींसाठी एक रुपया आणि त्यानंतरच्या प्रत्येक ओळीसाठी आठ आणे लागत असत.
नाशिकच्या सार्वजनिक वाचनालयात ह्या वृत्तपत्राचे काही जुने अंक संरक्षित केलेले आहेत.
नाशिकवृत्त किंवा त्याचे मालक-संपादक श्री. काळे यांच्याबद्दल जास्त माहिती कुणी देऊ शकेल का ?

 
 1818 सालचा त्र्यंबकगड किल्ला नकाशा


 आज गुढीपाडवा, आजपासून शालिवाहन शक १९४६ सुरू झाले. आपल्या नवीन वर्षाचा हा पहिला दिवस का साजरा करण्यात येतो याविषयी प्राचीनकाळापासून अनेक आख्यायिका सांगितल्या जातात. ब्रह्मदेवाने या दिवशी सृष्टीची निर्मिती केली, शंकरपार्वतीचे लग्न यादिवशी ठरले, रावणाचा वध करून श्रीरामाने या दिवशी अयोध्येत प्रवेश केला, उपचार नावाच्या एका राजाने इंद्रदेवाचे आपल्या राजदरबारात गुढी उभारून स्वागत केले आणि त्याचा विजय झाला तेव्हापासून प्रत्येक राजा विजयाचे प्रतीक म्हणून गुढीपाडवा साजरा करू लागला अशा अनेक आख्यायिका आहेत. श्रीरामाने यादिवशी अयोध्येत प्रवेश केला म्हणून गुढीपाडवा साजरा करतात हा प्रचलित समज. पण गुढीपाडवा आणि शालिवाहन शकाचा इतिहास वेगळा आहे आणि त्याचा आपल्या नाशिकशी अगदी घनिष्ट संबंध आहे.

सातवाहन हे दक्षिणेतील एक आद्य राजकुळ. सातवाहनांनी इसवी सन पूर्व २३० ते इसवी सन २२० अशी जवळपास पाचशे वर्ष राज्य केले. महाराष्ट्र, आंध्रप्रदेश, कर्नाटक या प्रदेशांवर त्यांची बलाढ्य, संपन्न सत्ता होती. सातवाहन राजे फार उदार होते, त्यांनी बौद्ध धर्माला राजाश्रय दिला होता. प्रतिष्ठान म्हणजे पैठण ही त्यांची राजधानी. आपल्या महाराष्ट्रीय संस्कृतीचा पाया सातवाहन काळात घातला गेला. सर्वात पराक्रमी सातवाहन राजा गौतमीपुत्र सातकर्णी याने इ.स. ७८ साली त्यांचे प्रतिस्पर्धी असलेल्या आक्रमक शक म्हणजे पश्चिमी क्षत्रपांचा नाशिकजवळ झालेल्या मोठ्या युद्धात पराभव करून शकांचे समूळ उच्चाटन केले. क्षत्रप राजा नहपान याला ठार मारले. हे युद्ध नाशिकजवळच्या गंगापूर - गोवर्धन गावाजवळ झाले. गोवर्धन येथे सातवाहनकाळात मोठी बाजारपेठ होती. नाशिकची लेणी म्हणजे आपण पांडवलेणी म्हणतो ती दोन हजार वर्षांपूर्वी सातवाहनकाळातच निर्मिलेली आहे. ती बौद्ध लेणी आहे. पांडवांशी त्यांचा काही संबंध नाही. तिचे नाव त्रिरश्मी लेणी. त्रिरश्मी त्या डोंगराचे नाव आहे. तिथे बौद्ध विहार आणि चैत्य होते. सातवाहनांनी तसेच क्षत्रप, अभीर राजांनीही दाने दिलेली आहेत. त्यांचे त्या लेणीसमूहातील अनेक लेण्यांवर मोठमोठे शिलालेख कोरलेले आहेत. त्यांत गोवर्धनजवळ झालेल्या त्या युद्धाचाही शिलालेख आहे. त्रिसमुद्रतोयपीतवाहन म्हणजे ज्याचे घोडे तीन समुद्रांचे पाणी प्यायलेले आहेत असा महापराक्रमी सातवाहन राजा गौतमीपुत्र सातकर्णी याने नाशिकजवळ झालेल्या युद्धात शकांवर मिळवलेल्या विजयाचे प्रतीक म्हणून गुढीपाडवा साजरा केला जातो. याबाबतीत एक आख्यायिकाही आहे की शालिवाहन नावाच्या कुंभाराच्या मुलाने शकांचा पराभव करण्यासाठी सहा हजार मातीच्या सैनिकांचे पुतळे तयार केले व त्यात प्राण घालून त्यांच्या साह्याने या दिवशी शकांचा पराभव केला. याच शालिवाहन राजाच्या नावाने नवीन कालगणना शालिवाहन शक चालू झाला. ही झाली आख्यायिका. पण त्यामागचा इतिहास वर थोडक्यात सांगितलेला आहे. सातवाहनांच्या शकांवरील त्या विजयाला आज १९४५ वर्ष पूर्ण झाली. आजपासून शालिवाहन शक १९४६ चालू झाले. शालिवाहन म्हणजे सातवाहन.

- प्रणव कुलकर्णी.

नाशिकच्या त्रिरश्मी बौद्ध लेण्यांचे (पांडवलेणी) एक चित्र. हे रेखाचित्र १८९९ सालच्या 'हिस्ट्री ऑफ इंडियन अँड इस्टर्न आर्किटेक्चर - जेम्स फर्ग्युसन' या पुस्तकातील आहे.


डॉ.बाबासाहेब आंबेडकर आणि नाशिक

आज प्रज्ञासुर्य भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर ह्यांची जयंती.!!
बाबासाहेबांच्या सामाजिक क्रांतीच्या इतिहासात नाशिक जिल्ह्याचे फार महत्व आहे. किंबहुना नाशिकचा इतिहास बाबासाहेबांच्या उल्लेखाशिवाय पुर्ण होणार नाहीं!

अस्पृश्य बांधवाना मंदिर प्रवेशाचा अधिकार मिळावा म्हणून काळाराम मंदिर येथे केलेला सत्याग्रह, नाशिकरोड येथे सिक्युरिटी प्रेसच्या कामगारांच्या वेतनाच्या प्रश्नासंदर्भात घेतलेल्या बैठका, येवला तालुक्यात केलेली धर्मांतराची घोषणा, दलित चळवळीतले अग्रगण्य नेते दादासाहेब गायकवाड ह्यांना लाभलेली खासदारकी....... अशा अनेक गोष्टींच्या निमित्ताने बाबासाहेबांचा नाशिकशी संबंध येत राहिला. त्यांना वकिली शिक्षण पूर्ण करून आल्यानंतर पहिली केस मिळाली ती देखील नाशिक मधून..!!!

बाबासाहेबांचे आणि नाशिकचे असे ऐतिहासिक नाते आहे.

आपल्या समूहाच्यावतीने बाबासाहेबांना हार्दिक अभिवादन !!
जय भीम.












नाशिकमध्ये करण्यासारख्या गोष्टी – एक संपूर्ण प्रवास मार्गदर्शक

पुढच्या प्रवासासाठी ठिकाण निवडताना तुम्ही सहसा तुमच्या मनःस्थितीचा विचार करता. मला साहसाचा थरार हवा आहे की आराम करण्यासाठी एखादे शांत ठिकाण? रुचकर जेवण की स्वतःच्या आध्यात्मिक बाजूचा शोध? जर आम्ही तुम्हाला सांगितले की हे सर्व तुम्हाला एकाच ठिकाणी मिळू शकते, तर? मुंबईच्या वेगवान जीवनापासून सुमारे १६० किमी अंतरावर असलेले नाशिक, हे भारतातील सर्वात दुर्लक्षित पर्यटन स्थळांपैकी एक आहे. येथे फिरल्यावर तुम्हाला एकाच शहरात दोन भिन्न जग आढळतील.

नाशिक

नाशिकला देशाची वाईन राजधानी म्हणून ओळखले जाते, जिथे भारतातील सर्वोत्तम वाईनचा आस्वाद घेण्यासाठी वाईनप्रेमी भेट देतात. दुसरीकडे, नाशिकला अत्यंत धार्मिक महत्त्व असून ते भाविकांसाठी एक लोकप्रिय ठिकाण आहे. तुम्ही या नंदनवनात खोलवर जाण्यासाठी तयार आहात का? नाशिकमध्ये सोयीस्कर प्रवासासाठी सावारी कॅब भाड्याने घ्या . चला, नाशिकच्या विविध पैलूंचा तपशीलवार शोध घेऊया आणि ते तुमच्या प्रवासाच्या यादीत का असले पाहिजे हे समजून घेऊया.

अनुक्रमणिका

  1. नाशिकमध्ये करण्यासारख्या गोष्टी
  2. नाशिकच्या सहलीचे नियोजन कसे करावे
  3. नाशिकबद्दल
  4. नाशिकमधील हॉटेल्स

नाशिकमध्ये करण्यासारख्या गोष्टी

नाशिक घोडा घाट
घोडा घाट

शांत मंदिरांमध्ये अध्यात्माचा अनुभव घ्या. 

तुम्हाला अशी अनेक मंदिरे आढळतील ज्यांचा उगम रामायणाच्या काळापर्यंत शोधता येतो. नाशिकमध्ये तपोवन नावाचे एक जंगल आहे, जिथे भगवान राम आणि सीता वनवासाच्या काळात राहिले होते असे मानले जाते. तुम्हाला गोदावरीच्या काठावरही अनेक महत्त्वपूर्ण मंदिरे आढळतील. तुमच्या पुढच्या प्रवासात तुम्ही भेट देऊ शकता अशी काही ठिकाणे खालीलप्रमाणे आहेत – 

राम कुंड – गोदावरी नदीच्या काठावरील पवित्र राम कुंडला भेट द्या. भगवान राम आणि सीता यांचे स्नानस्थळ मानले जाणारे हे ठिकाण, १९६९ च्या सुमारास चित्रराव खाटरकर यांनी बांधले. राम कुंड हे शहरातील सर्वात पवित्र स्थान मानले जाते. असेही म्हटले जाते की, या ठिकाणी हाडे विरघळवणारे अस्थीविलय तीर्थ आहे. देवतेच्या स्मरणात मग्न होऊन आपल्या आध्यात्मिक आत्म्यासोबत काही वेळ घालवा.

बालाजी मंदिर – तिरुपती बालाजीची प्रतिकृती असलेले हे नाशिकमधील सर्वात स्वच्छ मंदिरांपैकी एक आहे. येथे आल्यावर तुम्ही गोदावरी नदीकिनारी असलेल्या दुधसागर धबधब्यालाही भेट देऊ शकता. तुम्ही मंदिरात असलेल्या अर्धमंडप आणि गर्भगृहालाही भेट देऊ शकता.

नाशिकमध्ये करण्यासारख्या गोष्टी

त्र्यंबकेश्वर मंदिर – द्वीपकल्पीय भारतातील सर्वात लांब नदीचा उगम पाहा. भव्य त्र्यंबकेश्वर मंदिर हे भगवान शिवाला समर्पित असलेल्या बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक आहे. हे ठिकाण गोदावरी नदीचे उगमस्थान असल्याचेही मानले जाते. १८ व्या शतकात मराठा शासक पेशवा नानासाहेब यांनी बांधलेले हे मंदिर सुमारे शंभर फूट उंच आहे. ब्रह्मगिरी, निलागिरी आणि काळागिरी या तीन टेकड्यांच्या मध्ये वसलेल्या या मंदिरात शिव, विष्णू आणि ब्रह्मा यांचे प्रतिनिधित्व करणारे तीन लिंग आहेत.

मुक्तिधाम – नाशिक रेल्वे स्टेशनजवळ असलेले हे मंदिर पांढऱ्या संगमरवराने बांधलेले आहे. याच्या भिंतींवर गीतेच्या १८ अध्यायांचे लिखाण पाहून तुम्ही थक्क व्हाल. पर्यटकांमध्ये लोकप्रिय असलेले हे मंदिर पवित्र धामांपैकी एक मानले जाते.

साहसाची आस असलेल्या तुमच्या हृदयाला तृप्त करा.

नाशिकमध्ये तुमच्या कल्पनेपेक्षाही जास्त आश्चर्ये आहेत. व्हाईट वॉटर राफ्टिंगपासून ते द्राक्षांच्या मळ्यांमध्ये वाईनचा आस्वाद घेत दिवस घालवण्यापर्यंत, तुमच्या साहसी मनाला हवं असलेलं सर्व काही तुम्हाला इथे मिळेल. चला पाहूया, नाशिकमधील तुमचा एक दिवस कसा असू शकतो. 

सुला वाईनयार्ड्स – नाशिकबद्दलचा कोणताही ब्लॉग या ठिकाणाचा उल्लेख केल्याशिवाय पूर्ण होऊ शकत नाही. देशातील सर्वात लोकप्रिय वाईनयार्ड्सपैकी एक असलेल्या सुला वाईनयार्डमध्ये वाईनचे विविध प्रकार चाखण्याची संधी मिळते. फेब्रुवारी महिन्यात होणाऱ्या त्यांच्या वार्षिक 'सुला फेस्ट' दरम्यान त्यांना नक्की भेट द्या.

[हे सुद्धा वाचा: मुंबईजवळ रस्त्याने भेट देण्यासारखी ठिकाणे ]

नाशिकमध्ये करण्यासारख्या गोष्टी

व्हाइट वॉटर राफ्टिंग – हे ठिकाण वैतरणा नदीवरील ॲडव्हेंचर कॅम्प झोनमध्ये आहे. मित्रांसोबत खवळलेल्या पाण्याचा सामना करण्याचा अनुभव तुम्ही एकदा तरी घेतलाच पाहिजे! तुमची सुरक्षितता सुनिश्चित करण्यासाठी आणि तुमचा अनुभव समृद्ध करण्यासाठी ते सर्वोत्तम दर्जाच्या सेवा पुरवतात.

ब्रह्मगिरी टेकड्यांचे ट्रेकिंग – नाशिकमधील सर्वोत्तम ट्रेकिंग ठिकाणांपैकी एक असलेल्या या टेकडीच्या माथ्यावर तुम्हाला एकेकाळच्या भव्य किल्ल्याचे अवशेष आढळतील. या ट्रेकची अडचण पातळी मध्यम आहे, त्यामुळे तुमच्या पाण्याच्या बाटल्या सोबत ठेवा आणि शरीरातील पाण्याची पातळी टिकवून ठेवा!

पांडवलेणी लेणी – पांडू लेणी किंवा नाशिक लेणी म्हणूनही ओळखल्या जाणाऱ्या या लेण्या अंदाजे तिसऱ्या शतकात बांधल्या गेल्या. जर तुम्ही इतिहासप्रेमी असाल, तर हे तुमच्यासाठी एक उत्तम ठिकाण आहे! त्रिवश्मी टेकड्यांच्या पायथ्याशी वसलेल्या या लेण्या, हीनयान बौद्ध धर्माचे प्रतिनिधित्व करणाऱ्या २४ लेण्यांचा एक जोडलेला समूह आहे.

नाशिकच्या सहलीचे नियोजन कसे करावे

नाशिकच्या सहलीचे नियोजन करताना, तुमच्या भेटीची वेळ ठरवणे हे तुमचे पहिले पाऊल असले पाहिजे. ऑक्टोबर ते मार्च या हिवाळ्याच्या महिन्यांत हे शहर सर्वात जास्त आकर्षक वाटते, कारण या काळात हवामान आल्हाददायक आणि पर्यटनासाठी आदर्श असते. तुमच्या तारखा निश्चित झाल्यावर, चांगली सोय मिळवण्यासाठी तुम्ही तुमच्या निवासाची सोय बुक केली पाहिजे. त्यानंतर, तुम्हाला भेट द्यायची असलेली ठिकाणे शोधून आणि ठरवून तुमच्या प्रवासाचा आराखडा तयार करा.

नाशिकमध्ये त्र्यंबकेश्वर मंदिर, सुला व्हाइनयार्ड्स, रामकुंड, पंचवटी आणि पांडवलेणी लेणी यांसारखी अनेक आकर्षक स्थळे आहेत. तसेच, प्रत्येक ठिकाणी लागणाऱ्या वेळेचाही विचार करा. शेवटी, तुमच्या वाहतुकीची व्यवस्था करा. नाशिक हवाई, रेल्वे आणि रस्ते मार्गाने भारतातील इतर प्रमुख शहरांशी चांगल्या प्रकारे जोडलेले आहे. शहरांतर्गत प्रवासासाठी, तुम्ही एका विश्वसनीय कार भाड्याने देणाऱ्या सेवेची निवड करू शकता.

नाशिकमध्ये करण्यासारख्या गोष्टी

नाशिकला कसे पोहोचावे

भारतातील महाराष्ट्र राज्यातील नाशिक शहरात, हवाई, रेल्वे आणि रस्ता यांसारख्या विविध वाहतूक साधनांद्वारे पोहोचता येते.

विमानाने:

नाशिक विमानतळ (ओझर विमानतळ म्हणूनही ओळखले जाते) हे नाशिकच्या सर्वात जवळचे विमानतळ आहे. विमानतळावर उतरल्यावर, शहरातील तुमच्या निवासस्थानी पोहोचण्यासाठी तुम्ही सावारी एअरपोर्ट टॅक्सी बुक करू शकता. सावारी विमानतळावरून शहराच्या विविध भागांपर्यंत विश्वसनीय आणि आरामदायक टॅक्सी सेवा पुरवते.

ट्रेनने

नाशिक भारतातील प्रमुख शहरांशी रेल्वेने चांगल्या प्रकारे जोडलेले आहे. नाशिक रोड रेल्वे स्टेशन हे शहराचे मध्यवर्ती रेल्वे स्थानक आहे. रेल्वे स्थानकावरून, शहरातील आपल्या इच्छित स्थळी पोहोचण्यासाठी आपण टॅक्सी भाड्याने घेऊ शकता किंवा बसने प्रवास करू शकता.

रस्त्याने

नाशिक मुंबई, पुणे आणि अहमदाबाद यांसारख्या प्रमुख शहरांशी चांगल्या प्रकारे जोडलेले आहे. जर तुम्ही मुंबईहून नाशिकला गाडीने जाण्याचा विचार करत असाल, तर तुम्ही राष्ट्रीय महामार्ग ३ (NH3) चा भाग असलेल्या मुंबई-नाशिक द्रुतगती मार्गाचा वापर करू शकता. वाहतुकीच्या परिस्थितीनुसार, या प्रवासाला साधारणपणे ३ ते ४ तास लागतात. याव्यतिरिक्त, तुम्ही मुंबईहून नाशिकला जाण्यासाठी कॅब भाड्याने घेऊ शकता .

भेट देण्यासाठी सर्वोत्तम वेळ

नाशिकला भेट देण्यासाठी ऑक्टोबर ते मार्च हा हिवाळ्याचा काळ सर्वोत्तम आहे. या काळात हवामान आल्हाददायक असते, ज्यामुळे पर्यटनासाठी हा काळ आदर्श ठरतो. पावसाळ्यात (जून ते सप्टेंबर) देखील भेट देणे उत्तम ठरू शकते, कारण परिसर हिरवागार आणि सुंदर होतो, परंतु मुसळधार पावसामुळे प्रवासाच्या योजनांमध्ये व्यत्यय येऊ शकतो.

नाशिकमध्ये खाण्याची ठिकाणे

स्थानिक खाद्यसंस्कृतीचा आस्वाद घ्यायला विसरू नका. नाशिकमध्ये तोंडाला पाणी आणणारे पदार्थ देणारी विविध प्रकारची उपाहारगृहे आहेत.

  1. हॉटेल साधना, शालीमार चौक : पारंपरिक महाराष्ट्रीयन थाळीसाठी प्रसिद्ध.
  2. चुलीवरची मिसळ, गंगापूर रोड : येथील स्थानिक वैशिष्ट्य असलेला मसालेदार आणि चवदार मिसळ पाव खायला विसरू नका.
  3. बार्बेक्यू व्हिल, कराम्बेली: बार्बेक्यू आणि ग्रिलच्या शौकिनांसाठी आवर्जून भेट देण्यासारखे ठिकाण.
  4. सोमा वाईन व्हिलेज, गंगावणे: त्यांच्या द्राक्षबागेत स्वादिष्ट जेवण आणि विविध प्रकारच्या वाईनचा आस्वाद घ्या.
  5. श्री दत्ता स्नॅक्स, पंचवटी: त्यांच्या विविध प्रकारच्या चाट आणि स्नॅक्ससाठी प्रसिद्ध.
  6. रसोई, सीबीएस रोड: विविध उत्तर भारतीय आणि मुघलाई पदार्थांसाठी भेट द्या.
  7. कढीपत्ता, त्र्यंबक रोड : दक्षिण भारतीय खाद्यपदार्थांची चव घेण्यासाठी एक उत्तम ठिकाण.
  8. पंचवटी गौरव, सीबीएस रोड : त्यांच्या स्वादिष्ट गुजराती थाळीसाठी नक्की भेट द्या.

नाशिकबद्दल

नाशिक, ज्याला नाशिक असेही म्हणतात, हे भारतातील महाराष्ट्राच्या वायव्य भागातील एक प्राचीन शहर आहे. दर बारा वर्षांनी होणाऱ्या भव्य हिंदू तीर्थयात्रेचे, कुंभमेळ्याचे आयोजन करणाऱ्या चार शहरांपैकी हे एक आहे. नाशिक हे त्याच्या निसर्गरम्य परिसरासाठी, सुखद हवामानासाठी, चैतन्यमय संस्कृतीसाठी आणि असंख्य मंदिरांसाठी ओळखले जाते. याशिवाय, हे उत्पादन, कृषी-प्रक्रिया आणि वाइन-निर्मिती उद्योगांचे एक महत्त्वाचे केंद्र देखील आहे. माझ्या माहितीनुसार २०२१ मध्ये, नाशिक हे भारताची “वाइन कॅपिटल” होते, जिथे भारतातील सुमारे अर्धे द्राक्षांचे मळे आणि वाइनरी होत्या.

भूगोल

नाशिक

नाशिक वायव्य महाराष्ट्रात, मुंबई आणि पुण्यापासून सुमारे २०० किलोमीटर अंतरावर वसलेले आहे. हे शहर 'दक्षिणेची गंगा' म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पवित्र गोदावरी नदीच्या काठावर वसलेले आहे. नाशिकचा भूप्रदेश डोंगर, सुपीक मैदाने आणि नदीखोऱ्यांनी वेढलेला असून तो विविध प्रकारचा आहे. पश्चिम घाट नाशिकची पश्चिम सीमा तयार करतात, ज्यामुळे हे शहर खनिज संपत्तीने समृद्ध आणि वनस्पती व प्राणीजीवनात वैविध्यपूर्ण आहे.

नाशिकचे हवामान हे महाराष्ट्रात सामान्यतः आढळणाऱ्या किनारपट्टी आणि अंतर्गत भागातील हवामानाचे मिश्रण आहे. उन्हाळ्यात कमाल तापमान ४२°C पर्यंत पोहोचू शकते आणि हिवाळ्यात ते सुमारे ७°C पर्यंत खाली येते. शहरात जून ते सप्टेंबर या काळात पावसाळा असतो.

इतिहास

नाशिकचा इतिहास रामायण महाकाव्याच्या काळापर्यंत मागे जातो. प्रभू रामांनी त्यांच्या १४ वर्षांच्या वनवासात येथे वास्तव्य केले होते, असे मानले जाते. त्यामुळे, या शहरात महाकाव्याशी संबंधित अनेक स्थळे आहेत, ज्यात प्रसिद्ध त्र्यंबकेश्वर शिव मंदिर आणि काळाराम मंदिराचा समावेश आहे. ऐतिहासिकदृष्ट्या, मुघल काळात नाशिक 'गुलशनबाद' म्हणून ओळखले जात होते आणि नंतर ब्रिटिश राजवटीत त्याला त्याचे सध्याचे नाव, नाशिक, मिळाले.

मुघलांनी जिंकण्यापूर्वी हे शहर मौर्य, सातवाहन, अभिर, वाकाटक, कलचुरी, चालुक्य, राष्ट्रकूट आणि यादव यांसारख्या विविध राजवंशांच्या अधिपत्याखाली होते. त्यानंतर १८ व्या शतकात ते मराठ्यांच्या अधिपत्याखाली आले. १९ व्या शतकातील इंग्रज-मराठा युद्धानंतर नाशिक बॉम्बे प्रेसिडेंसीचा भाग बनले.

कमी ज्ञात तथ्ये

  1. नाशिक हा लोकसंख्येच्या दृष्टीने महाराष्ट्रातील तिसरा सर्वात मोठा जिल्हा असून, राज्यातील द्राक्ष लागवडीतील महत्त्वपूर्ण योगदानामुळे त्याला “द्राक्षांचे शहर” म्हणून ओळखले जाते.
  2. हे शहर भारत सरकारच्या सिक्युरिटी प्रिंटिंग प्रेससाठी देखील ओळखले जाते, जिथे चलन आणि सरकारी टपाल तिकिटे छापली जातात.
  3. पहिल्या महायुद्धादरम्यान, या शहरात एक मोठी लष्करी छावणी होती जिथे ब्रिटिश भारतीय सैन्याच्या सैनिकांना प्रशिक्षण दिले जात होते.
  4. हे शहर 'नाशिक ढोल' परंपरेसाठी प्रसिद्ध आहे, जी गणेश चतुर्थी आणि इतर सणासुदीच्या काळात सादर केली जाणारी एक अनोखी ढोलवादन शैली आहे.
  5. नाशिकमध्ये पंचवटी नावाचे एक वेगळे ठिकाण आहे, जिथे पाच वटवृक्ष आणि अनेक मंदिरे आहेत. हे ठिकाण दंडकारण्य वनाचा एक भाग मानले जाते, जिथे भगवान राम, सीता आणि लक्ष्मण यांनी त्यांच्या वनवासाची काही वर्षे घालवली होती.
  6. हे शहर पवित्र गोदावरी नदीचे उगमस्थान देखील आहे. या धार्मिक महत्त्वामुळे, येथे दर १२ वर्षांनी प्रसिद्ध कुंभमेळा भरतो.

नाशिकमधील हॉटेल्स आणि रिसॉर्ट्स

तुमच्या बजेट आणि सोयीनुसार, प्रमुख पर्यटन स्थळांच्या जवळ असलेले किंवा चांगली कनेक्टिव्हिटी असलेले हॉटेल निवडा.

  1. ताज गेटवे हॉटेल अंबड , अंबड: उत्कृष्ट सोयीसुविधा आणि सेवा पुरवणारे एक आलिशान ५-तारांकित हॉटेल.
  2. एक्सप्रेस इन , पाथर्डी फाटा: आलिशान आणि व्यावसायिक सेवा पुरवते आणि आपल्या पाहुणचारासाठी ओळखले जाते.
  3. सोमा वाईनयार्ड रिसॉर्ट , गंगावणे: वाईनप्रेमींसाठी एक उत्तम ठिकाण, येथे वाईन टूर आणि टेस्टिंगची सोय आहे.
  4. हॉटेल सेव्हन हेवन , पाथर्डी फाटा: चांगल्या सोयीसुविधा आणि सेवा असलेले एक माफक दरातील हॉटेल.
  5. आयबिस , नाशिक-त्र्यंबकेश्वर रोड: व्यावसायिक आणि निवासासाठी प्रवास करणाऱ्यांसाठी एक आदर्श असे किफायतशीर हॉटेल.
  6. तीर्थ व्हिला , आनंदवल्ली: एक आरामदायक आणि घरगुती निवास व न्याहारी.
  7. जिंजर नाशिक , सातपूर: चांगल्या सुविधा आणि उत्तम सेवा देणारे एक बजेट हॉटेल.

तुम्ही मित्रांसोबत वीकेंड घालवू इच्छित असाल, तुमच्या जोडीदारासोबत रोमँटिक सहलीला जाऊ इच्छित असाल किंवा कुटुंबासोबत सुट्टी घालवू इच्छित असाल, हे शहर तुम्हाला निराश करणार नाही. येथे सहज पोहोचता येते आणि वेगवेगळ्या बजेट व आवडीनिवडींनुसार राहण्याचे विविध पर्याय उपलब्ध आहेत. तर मग, तुमच्या बॅग्स भरा, सवारी कॅब बुकिंग ॲप डाउनलोड करा, प्रवासाला निघा आणि आयुष्यभर टिकणाऱ्या आठवणी तयार करण्यासाठी सज्ज व्हा .

शेवटचे अद्यतन ५ फेब्रुवारी, २०२४ रोजी


https://www-savaari-com.translate.goog/blog/things-to-do-in-nashik/?_x_tr_sl=en&_x_tr_tl=mr&_x_tr_hl=mr&_x_tr_pto=imgs

 
 

No comments:

Post a Comment

मनसर

 प्रकार : गिरीदुर्ग जिल्हा : नागपुर उंची : १२०० फुट ...