जिल्हा : नागपुर
उंची : १२०० फुट
गिरीदुर्ग नागपूर भिमसेन कुवारा
🏔️
श्रेणी नुसार स्तर
मध्यम
📏
समुद्र सपाटीपासून उंची (फ़ूट)
1446
🏰
किल्ल्याचा प्रकार
गिरीदुर्ग
किल्ल्यापर्यंत पोहोचण्यासाठी सविस्तर नकाशे आणि ट्रेकिंग मार्ग पहा
सध्या कोणतेही नकाशे उपलब्ध नाहीत
भिवागड किल्ला सध्या भिमसेन कुवारा या नावाने ओळखला जातो. भिमसेन कुवारा हे पेंच अभयारण्याच्या परिसरातील प्रसिद्ध देवस्थान आहे. त्यामुळे या ठिकाणी भक्त आणि पर्यटकांचा राबता कायम असतो. पेंच धरणाच्या बॅक वॉटरने किल्ल्याला तीन बाजूने विळखा घातलेला आहे. त्यामुळे किल्ल्याच्या आजूबाजूला पसरलेले पाणी आणि दूरवर दिसणारे घनदाट जंगल यामुळे हा परिसर खूप सुंदर दिसतो .
भिवागडच्या पायथ्यापर्यंत खाजगी वहानाने जाता येते . वहानतळा जवळ जलाशयाला लागून भिमसेन कुवाराचे मंदिर आहे . आदिवासी दंतकथेनुसार भिमसेन गडा वरील त्याच्या स्थाना वरून ३ पावलात या ठिकाणी येउन बसला . मंदिराच्या थोडे पुढे एक पाण्याची चौकोनी विहीर आहे . या ठिकाणी भिमसेनने दुसरे पाऊल ठेवले होते . येथून मळलेल्या पायवाटेने भिवागड किल्ल्याच्या दिशेने जातांना एक ओढा ओलांडावा लागतो . या ओढ्या जवळ भिमसेनने पहिले पाउल ठेवले होते . ओढ्याच्या पुढे वाट चढत, वळसे घेत किल्ल्याच्या डोंगरा पर्यंत जाते . किल्ल्याच्या डोंगराला भिडलो की खडा चढ चालू होतो . साधारणपणे १५ मिनिटात आपण बुरुजाजवळ पोहोचतो. हा बुरुज दगड एकमेकावर रचून बनवलेला आहे . या किल्ल्यावरील सर्व बुरूज चौकोनी आहेत आणि तटबंदीही रचीव दगडांची आहे . या बुरुजापासून पाच मिनिटात गड माथ्यावर पोहोचतो . इथे एका अनघड दगडाला शेंदूर लावलेला आहे . त्याला भीमसेन कुवारा म्हणतात . इथे एक पिंड सुध्दा आहे . डाव्या बाजूला एका बुरुजाचे अवशेष आहेत . भिमसेनाचे दर्शन घेउन उजव्या बाजूला पुढे चालायला सुरुवात केल्यावर एक खड्डा दिसतो या ठिकाणी एकेकाळी बारमाही पाणी मिळत होते . पण आता तेथे पाणी नाही आहे . या ठिकाणावरून थोडे खाली उतरुन मळलेल्या पायवाटेने सरळ चालत जातांना या पायवाटेला समांतर खालच्या बाजूला चौकनी बुरूज आणि तटबंदी पाहायला मिळतात . या पायवाटेने राणी महालाच्या दिशेने खाली उतरल्यावर किल्ल्याच्या साधारण पाव उंचीवर एक दरवाजा आहे . किल्ल्याच्या खाली राणीमहाल नावाची वास्तू आहे . महालातून किल्ल्यावर जाण्यासाठी हे प्रवेशव्दार होते. ऱाणी महाल सध्या धरणाच्या जलाशयात बुडालेला आहे. तो पाहाण्यासाठी बोटीने जावे लागते . वहानतळा जवळून बोटी सूटतात. माणशी ५०/- रुपये शुक्ल घेतात.
किल्ल्याचे प्रवेशद्वार पाहून आल्या मार्गाने पुन्हा किल्ल्यावर आल्यावर आपली गडफेरी पूर्ण होते . किल्ला पाहाण्यासाठी पाउण तास लागतो .
नागपूर ते भिवागड (भिमसेन कुवारा) अंतर ४६ किलोमीटर आहे.
⏱️ पायथ्यापासून अर्धा तास लागतो.
🏠
किल्ल्याच्या पायथ्याशी असलेल्या मंदिरात राहाण्याची सोय होवू शकेल.
🍽️
किल्ल्यावर जेवणाची सोय नाही .
💧
नागपूर पासून ५०
किमी अंतरावर व रामटेक पासून ७ किमी अंतरावर "नगरधन" नावाचा सुंदर भुईकोट
किल्ला आहे. नागपूर जवळील रामटेक पहायला येणारे पर्यटक मात्र या
किल्ल्याकडे फिरकत नाहीत. इ.स. २०१२ मध्ये पुरातत्व खात्याने या किल्ल्याची
डागडूजी केलेली आहे. त्यामुळे हा किल्ला आता पुन्हा आपले पूर्वीचे वैभव
दाखवत दिमाखात उभा आहे. किल्ल्यातील भूयारी मंदिर हे अजून एक आकर्षण आहे.
मध्यप्रदेशातील उज्जैन नगरीचा राजा विक्रमादित्य याने आपली मुलगी प्रभावती
हिला विदर्भाची जहागिरी दिली होती. या प्रदेशाची व्यवस्था लावण्यासाठी
तिच्या सोबत महाकवी कालिदासांची प्रशासक म्हणून नेमणूक करण्यात आली.
त्यावेळी त्यांचा मुक्काम नगरधन किल्ल्यातच होता. याच किल्ल्यातून दूर
दिसणार्या रामटेकच्या डोंगरावर उतरलेल्या पावसाळ्याच्या पहिल्या मेघाला (
आषाढातल्या पहिल्या मेघाला) पाहून कालिदास उज्जैन नगरीच्या आठवणींनी
व्याकुळ झाले व त्यांना मेघदूत हे अजरामर काव्य सुचले अशी आख्यायिका आहे.
नगरधन ही वाकाटक घराण्याची राजधानी होती. तेंव्हा पासून म्हणजेच इ.स. ५
ते १८ व्या शतकापर्यंत हा किल्ला नांदता होता. गडा व्यतिरीक्त गावातही
अनेक पूरातन अवशेष विखुरलेले आहेत.
नगरधन किल्ला पुरातत्व
खात्याच्या अख्यातरीत असल्याने किल्ल्याचे प्रवेशव्दार सकाळी ९.०० ते
संध्याकाळी ५.०० वाजेपर्यंत उघडे असते. सोमवारी किल्ला पाहाण्यासाठी बंद
असतो.
स्थानिक आख्यायिके नुसार या किल्ल्याची
निर्मिती नंद राजाने केली. इतिहासकारांच्या मते इ.सनाच्या ४ थ्या ५ व्या
शतकात नंदिवर्धन राजाने या किल्ल्याची व नगराची उभारणी केली व ते भरभराटीस
आणले. त्याच बरोबर राजप्रासाद, मंदिरे,जलाशय यांची निर्मिती केली. वाकटाकां
नंतर नल व स्वामिराज (इ.स.५७३) यांच्या काळात हे स्थान राजकीय दृष्ट्या
महत्वाचे होते. त्यानंतर आलेल्या राष्ट्रकुटांच्या काळात नगरधन हे केवळ एका
जिल्ह्याचे मुख्यालय होते. पुढे गोंड राजाने वाकाटकांच्या जुन्या
किल्ल्यांच्या अवशेषांवर नविन किल्ला बांधला, त्यात जून्या किल्ल्याचे
साहीत्य वापरण्यात आले होते. पेशव्यांच्या काळात नागपूरकर भोसल्यांनी या
किल्ल्याची डागडूजी करून नविन बांधकामे केली.
प्रथमदर्शनी दिसणारे नगरधन किल्ल्याचे
वैशिष्ट्य म्हणजे तटबंदीत असलेले वेगवेगळ्या प्रकारचे बुरुज. या तटबंदीत
चौकोनी, गोल, अष्टकोनी आकाराचे बुरुज पहायला मिळतात. किल्ल्याच्या तटबंदीची
उंची ६ ते ८ मीटर असून त्यावर चर्या आहेत. तटबंदीत जागोजागी जंग्या
बनवलेल्या आहेत. फांजी ३ ते ४ फूट रुंद असून त्यावरून किल्ल्याला आतून
प्रदक्षिणा घालता येते.
किल्ल्याचे उत्तराभिमूख प्रवेशव्दार १२
फूट उंच असून त्यावर नगारखाना आहे. प्रवेशव्दारातून आत आल्यावर समोरच
देवड्यांची रांग आहे.(पुढील काळात या भागात कचेर्या असण्याचीही शक्यता
आहे.) .नगरधन किल्ल्याचे दुसरे प्रवेशव्दार उत्तराभिमूख असून त्यावर
व्दारशिल्प कोरलेली आहेत. दरवाजावरील उजव्या कोपर्यात व मध्ये शरभ कोरलेले
असून डाव्या कोपर्यात २ हत्ती कोरलेले आहेत. दरवाजाच्या मधोमध गणेशमूर्ती
कोरलेली आहे. या प्रवेशव्दारातून किल्ल्यात प्रव्र्श केल्यावर डाव्या
हाताला घोड्यांच्या पागा आहेत, तर उजव्या बाजूला तटबंदीवर जाण्यासाठी छोटा
दरवाजा व जिना आहे. या जिन्याने वर गेल्यावर फांजीवर एक पीराचे थडगे आहे.
येथून पहिल्या प्रवेशव्दारावर असलेल्या नगारखान्या पर्यंत जाता येते.
जिन्यावरून उतरून समोर दिसणार्या भुयारीदेवीच्या मंदिराकडे चालत जावे.
याला भुयारी देवी न्हणत असले तरी येथे पाण्याच्या टाक्याजवळ देवीच्या
मुर्तीची स्थापना करून पाण्याच्या स्त्रोताचे पावित्र जपले आहे. या मंदिरात
जाण्यासाठी काळोख्या जिन्याने खाली उतरावे लागते. खालच्या भागात
उन्हाळ्याच्या दिवसात विश्रांती घेण्यासाठी दालन बनविलेले आहे. जमिनीच्या
पोटात व पाण्याच्या सानिध्यात हे दालन असल्यामुळे विदर्भाच्या उन्हाळ्यातही
येथे गारवा जाणवतो.
किल्ल्याच्या दक्षिणेकडील (मागच्या) भिंतीत
तीन कमानी असलेले दालन आहे . या दालनाच्या खाली जमिनीच्या खालच्या पातळीवर
चोर दरवाजा आहे. तेथून पुढे चालत गेल्यावर एक चौकोनी हौद आहे. या हौदात
जमिनीच्या खाली १० फूटावर एक विहिर खोदलेली आहे. हौदात उतरण्यासाठी
पायर्या आहेत. विदर्भातील कडक उन्हाळ्यात विहिरीच्या पाण्याचे कमीत कमी
बाष्पीभवन व्हावे यासाठी ही रचना करण्यात आलेली आहे. विहिरीच्या पुढच्या
बाजूस राजवाडा किंवा महालाचा चौथरा आहे. या महालात ४ बाजूंनी पायर्या
असलेला एक उथळ हौद आहे.( पूर्वीच्या काळी या हौदात कारंजा व कमळाची फूल
ठेवून महालाची शोभा वाढवली जात असावी) महालात येण्यासाठी असलेल
प्रवेशव्दार सध्या उध्वस्त अवस्थेत आहे. त्यावर नक्षीकामाचा उत्तम नमुना
आहे. या महाला पासून मुख्य प्रवेशव्दारा कडे आल्यावर आपली गड फेरी पूर्ण
होते.
नागपूर ते रामटेक अंतर ५0 किमी आहे. नागपूर ते रामटेक एसटीची बससेवा आहे. रामटेक गावातून उजव्या हाताचा रस्ता ७ किमीवरील नगरधन गावात जातो. रामटेकहून नगरधनला जाण्यासाठी रामटेक मध्ये ६ आसनी रिक्षा मिळतात. नगरधन गावा बाहेर नगरधन किल्ला आहे.
⏱️ गावातून ५ मिनिटे लागतात.
ता.रामटेक जि.नागपूर
हा किल्ला भुईकोट किल्ला या प्रकारात मोडतो.विस्ताराने आणि आकाराने हा किल्ला जरी लहान असला तरी विदर्भातील महत्त्वाच्या किल्ल्यात याची गणना होते.इ.स. पाचव्या शतकातील वाकाटक कालीन दुर्गाच्या अवशेषावर गोंड राजाच्या राजवटीत किल्ला बांधण्यात आला असल्याने जुन्या बांधकामातील विटांचा उपयोग आलेला आहे.नागपूर भोसल्यांच्या काळात या किल्याची वेळोवेळी डागडुजी काही नवीन बांधकामाची जोडणी यात करण्यात आली.
या किल्ल्याची लांबी १०२ मीटर व रुंदी ८८ मीटर असून तटबंदी आणि प्रवेशद्वार याची उंची ६ ते ८ मीटर पर्यंत आहे.किल्ल्याचे अजून एक वैशिष्ट्य त्याच्या तटबंदीत आहे.ते असे कि चौकोनी, गोल, अष्टकोनी आकाराचे बुरुज पहायला मिळतात.
किल्ल्याच्या उत्तराभिमुख प्रवेशद्वारावर श्री गणेशाचे शिल्पांकन असून कलश पूर्णविकसित कमळ,गजशार्दुल प्रवेशद्वार सुशोभीत आहे.प्रवेशद्वारावरच नगारखाना आहे.
दरवाजावर कोरलेली शरभशिल्पे
किल्ल्यात एक उथळ हौद आहे.यात उतरण्यासाठी चारही बाजूला पायऱ्या आहेत.पूर्वीच्याकाळी कदाचित यात उगवत असलेली कमळाची फुले महालाची शोभा वाढवत असावी.
किल्यातील “भुयारी मंदिर” हे एक अजून कवतिक आहे.
भूमिगत पाण्याचा हौद.
किल्ल्यात असलेल्या महालात येण्यासाठी असणारा दरवाजा जो सध्या उध्वस्त झालेला आहे.
नागपूर ते नगरधन अंतर ५० किलोमीटर आहे.नगरधन किल्ल्यासाठी रामटेकला यावे आणि तेथून ६ आसनी रिक्षाने जाता येते.हा किल्ला नगरधन गावाच्या जवळच आहे.

सदरील ताम्रपटाचे दोन पत्रे असून त्यांची लांबी २३ सेंमी. व रुंदी १४.४ सेंमी. आहे. दोन्ही पत्रे कडीमध्ये घातलेले असून त्या कडीवर मुद्रा आहे. मुद्रेचा आकार लंबवर्तुळाकार असून त्याची लांबी ७.२ सेंमी. व रुंदी ५.६ सेंमी. आहे. मुद्रेवर वरच्या भागात सूर्य व चंद्र आहेत. त्यानंतर चार ओळींच्या खाली एक फूल कोरलेले आहे. दोन्ही पत्र्यांच्या केवळ आतील भागावरच मजकूर लिहिला असून पहिल्या पत्र्यावर दहा व दुसऱ्यावर बारा ओळी आहेत. पहिल्या पत्र्यावरील अक्षरे ही दुसऱ्या पत्र्यावरील अक्षरांपेक्षा काहीशी मोठी आहेत. तसेच प्रत्येक अक्षराचा आकार ०.६२ सेंमी. आहे. दुसऱ्या पत्र्यावरील अक्षरांचा आकार ०.४७ सेंमी. आहे. ताम्रपटाचे वजन १.११६ किग्रॅ. आहे.
ताम्रपटातील लिपी कीलकशीर्षक असून काही अक्षरे वाकाटकांच्या इतर अभिलेखांमध्ये दिल्याप्रमाणे पेटिकाशीर्षक लिपीत आहेत. उदाहरणार्थ ‘ब’ आणि ‘स’. मिराशींच्या मतानुसार हे दानपत्र सर्वप्रथम पेटिकाशीर्षकानुसार लिहावयाचे असावे, परंतु नंतर ते कीलकशीर्षक लिपीत लिहिले गेले. या वरून असे दिसते की, याचा कोरक्या उत्तर भारतातील रहिवासी असावा, जो कीलकशीर्षकात लिहिण्यात निपुण होता. ‘ग’ आणि ‘स’ या अक्षरांना डावीकडे किंचित बाक दिसत आहे. ‘ण’ या अक्षराच्या डोक्यावरील आडव्या दंडासही बाक दिसतो. ‘अ’, ‘क’ आणि ‘र’ या अक्षरांतील उभे दंड लांब असून ते डावीकडे वळले आहेत. लेखामध्ये जिव्हामूलीय १२ व्या आणि १५ व्या ओळीत आले असून सहाव्या ओळीमध्ये उपध्मानीयाची खूण आहे. लेखामध्ये ‘र्’ नंतर आलेल्या व्यंजनाचे द्वित्व झालेले आहे.
ताम्रपटाची भाषा संस्कृत असून पहिल्या २० ओळी आणि २२ वी ओळ गद्यरूपात, तर २१ वी ओळ पद्यरूपात आहे. मुद्रेवरील मजकूरही पद्यात लिहिलेला आहे.
युवराज दिवाकरसेन राज्य करीत असताना त्याच्या राज्यकालाच्या १३ व्या वर्षी कार्तिक शुक्ल द्वादशीस हे दानपत्र दिले, असा ताम्रपटात उल्लेख आहे. गुप्त राजांची वंशावळ, प्रभावतीगुप्ताचा वाकाटक युवराज द्वितीय रुद्रसेन याच्याशी विवाह, त्याच्या मृत्युनंतर राणीने केलेला राज्यकारभार या सर्व तत्कालीन ऐतिहासिक घटनांवरून या ताम्रपटाचा काळ सर्वसाधारणपणे इ. स. ४१५ ते ४२० हा येईल, असे अनुमान पुराभिलेखतज्ज्ञा शोभना गोखले यांनी काढले आहे.
मुद्रेवर चंद्र-सूर्य असून त्याखाली वाकाटकांचे भूषण असलेल्या वारसाहक्काने राज्यपद मिळालेल्या मातेचे आणि युवराजाचे हे शासन शत्रूंचे पारिपत्य करो, अशा आशयाचा मजकूर आहे.
ताम्रपटाच्या पहिल्या पत्र्यावर प्रभावतीगुप्ताने आपल्या माहेर व सासरकडील मंडळी व त्यांच्या वैशिष्ट्यांची महती कोरवून घेतली आहे. दुसऱ्या पत्र्यावर आचार्य चनालस्वामी यांना प्रभावतीगुप्तेने दिलेले ग्रामदान व तत्संबंधित गोष्टींचे वर्णन केले आहे. लेखाचा कोरक्या चक्रदास आहे.
ताम्रपटात उल्लेखिलेल्या स्थलनामांपैकी ‘नंदिवर्धन’ हे गाव रामटेकजवळील नगरधन असावे, असे पुरातत्त्वज्ञ रावबहादूर हिरालाल यांनी सांगितले. त्यानंतर मिराशी यांनी ताम्रपटातील उर्वरित गावे वर्धा जिल्ह्यात शोधली. ‘सुप्रतिष्ठ आहार’ म्हणजे सामान्यतः सध्याचा हिंगणघाट तालुका, तर ‘दंगुण’ म्हणजेच सध्याचे हिंगणघाट असावे. ‘विलवणक’ ग्रामाचा संदर्भ हिंगणघाटाच्या पश्चिमेस ४ किमी अंतरावरील ‘वणी’ या स्थानाशी लावला जातो. कदापिंजन हे आग्नेय दिशेस सुमारे ४.८ किमी. अंतरावरील कधाजन असावे, असे मिराशींचे मत आहे. या ताम्रपटात शीर्षग्राम व सिदिविवरक या स्थलनामांचाही उल्लेख आलेला आहे.
प्रभावतीगुप्ता ही गुप्त सम्राट दुसरा चंद्रगुप्त आणि महाराणी कुबेरनागा यांची कन्या. या ताम्रपटात राणीने आपल्या माहेरच्या घराण्याची वंशावळ दिली आहे. शके ३८० मधील देवसेनाचा हिस्सेबोराळा प्रस्तरलेख वाकाटकांचा कालक्रम ठरविणारा महत्त्वाचा दुवा आहे, परंतु हा प्रस्तरलेख उजेडात येण्यापूर्वी पुणे ताम्रपट हा त्यातील गुप्त सम्राटांच्या उल्लेखांमुळे वाकाटक राजांचा कालक्रम ठरविणारा एकमेव ऐतिहासिक आधार होता.
या ताम्रपटामुळे हे स्पष्ट होते की, गुप्त सम्राट तसेच प्रभावतीगुप्ता विष्णूची उपासना करीत असत. राणीने स्वतःस ‘भगवदभक्ता’ म्हटले असून कार्तिक शुद्ध द्वादशीस दान केले आहे. वैष्णव-पंथामध्ये एकादशी आणि द्वादशी या दोन्ही तिथी अतिशय पुण्यकारक मानल्या आहेत. प्रभावतीगुप्ता रुद्रसेनाची अग्रमहिषी होती आणि युवराज दिवाकरसेनची माता होती, असे म्हटले आहे. रुद्रसेनाच्या मृत्यूनंतर तिने सु. १५ वर्षे राज्यकारभार पाहिला. तिने स्वतंत्रपणे ताम्रपट दान दिले. या सर्व गोष्टींवरून तिचे राजकारणातील श्रेष्ठत्व सिद्ध होते.
संदर्भ :
राष्ट्रीय महत्त्व असलेले भारतातील एक संरक्षित पुरातत्त्वीय उत्खनित स्थळ. महाराष्ट्र राज्यातील वर्धा जिल्ह्यात, वर्धा-नागपूर मार्गावर, वर्धा या शहरापासून सु. नऊ किमी. अंतरावर, धाम नदीकाठी पवनार वसले आहे. भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षण खात्याचे तत्कालीन महानिदेशक ⇨रावबहादूर का. ना. दीक्षित यांनी पवनार ही वाकाटक या राजघराण्याच्या मुख्य शाखेची राजधानी प्रवरपूर असावी, असे मत सर्वप्रथम व्यक्त केले. त्यानंतर प्राच्यविद्या संशोधक ⇨ वासुदेव विष्णु मिराशी व रावबहादूर हिरालाल यांनीही या मतास दुजोरा दिला व वाकाटकनृपती प्रवरसेन-दुसरा याची दुसरी राजधानी प्रवरपूर म्हणजेच सध्याचे पवनार असल्याचे प्रतिपादले. मात्र हरिहर ठोसर यांच्या मते, पवनार हे स्थलनाम पद्मनगरपासून उद्भवते; आणि म्हणून पवनारचे प्रवरपूर या प्राचीन नगरनामाशी साधर्म्य दर्शविता येत नाही. असे असले, तरी ठोसर यांनी राष्ट्रकूटनृपती नन्नराज युद्धासुर याच्या संगलूद दानपत्रात आढळणारे पद्मपूर सध्याचे पवनार असावे, असे अनुमान केले आहे.
१९३८ साली येथे आचार्य विनोबा भावे यांच्या परमधाम या आश्रमासाठीचे खोदकाम करीत असताना बरेच पूर्णाकृती शिल्पपट सापडले. यांत रामायण-कथानक कोरलेले शिल्पपट तसेच गंगाभगवती आदी शिल्पांचा समावेश आहे. ही सर्व शिल्पसंपदा आश्रमात प्रदर्शित केली आहे. या शिल्पांची शैली तसेच इतर अवशेषांवरून येथे वाकाटककाळातील ‘राम संप्रदाय’ तसेच कमीतकमी एक मोठे विष्णूचे देऊळ असावे असे एक मत आहे, तर काही विद्वानांच्या मते, ही शिल्पसंपदा विष्णुकुंडीन काळातील अथवा राष्ट्रकूटकाळातील शिल्पांचा प्रभाव असलेली आहे.

वरील पार्श्वभूमीवर १९६७ साली धाम नदीच्या उजव्या तीरावरील पांढरीच्या टेकाडावर नागपूर विद्यापीठाने पुरातत्त्वज्ञ शांताराम भालचंद्र देव आणि मधुकर केशव ढवळीकर यांच्या मार्गदर्शनाखाली मर्यादित स्वरूपाचे उत्खनन केले. येथे एकूण चार कालखंडांचे सांस्कृतिक अवशेष उजेडात आले. पहिल्या कालखंडातील वस्ती इ.स.पू. पहिल्या सहस्रकाइतकी प्राचीन असून ही वस्ती कुडाच्या घरांच्या स्वरूपांत उपलब्ध झाली. काळी-आणि-तांबडी या वर्गातील मृद्भांडी ही या वस्तीची वैशिष्ट्ये. हे लोक लोखंडाची उत्कृष्ट शस्त्रे बनवीत. त्यांची कलात्मकता ते वापरीत असलेल्या रंगीत मृद्भांड्यांत दिसून येते. मासेमारी, शेती व शिकार यांवर ते गुजराण करीत. विदर्भातील हे पहिले लोहयुगीन रहिवासी होते.
दुसरी वस्ती इ.स.पू. दुसऱ्या/तिसऱ्या शतकांत झाली. पहिल्या कालखंडातील काळी-आणि-तांबडी या वर्गातील मडक्यांपेक्षा या कालखंडातील मडकी जाड असून प्रामुख्याने थाळ्या व वाडग्यांच्या स्वरूपात वापरात कायम राहिली; मात्र रंगविलेली मडकी वापरात आढळत नाहीत. घरांच्या बांधणीत आमूलाग्र सुधारणा होऊन पवनारवासी पक्क्या घरांत राहू लागले. आर्थिक व्यवहारात नाण्यांचा वापर सुरू झाला. सातवाहन राजांची नाणी प्रचारात आली आणि पवनारला काहीसे नागरी स्वरूप आले. सांडपाण्याची शोषणकुंडे, अर्चनाकुंडे आदी अवशेष त्याची साक्ष आहेत. सातवाहनांच्या उत्तर काळात, इसवी सनाच्या पहिल्या दोन शतकांत, येथे व्यापारी भरभराट झाली. याची परिणती उत्कृष्ट बनावटीची तांबडी चकचकीत मृद्भांडी, रोमन काचेच्या वस्तू, रोमन मद्य व मद्यकुंभ पवनार येथे आयात करण्यामध्ये झालेली दिसून येते.
तिसरी वसाहत गुप्त-वाकाटक काळातील (इ.स. तिसरे ते पाचवे शतक). पवनार येथील सातवाहन काळातील आर्थिक सुबत्ता इसवी सनाच्या पाचव्या/सहाव्या शतकापर्यंत टिकली. दानधर्म वाढला आणि तत्कालीन प्रवरसेन-दुसरा यांसारख्या राजांनी अनेक ताम्रपटांद्वारे ब्राह्मणांना देणग्या दिल्या.
चौथा कालखंड मध्ययुगीन. वाकाटक कालखंडानंतर पवनारचे वैभव लुप्त झाले, अवनती सुरू झाली. मध्ययुगात काचेच्या बांगड्यांसारखे लघुउद्योग सुरू झाले.
संदर्भ :
भारतातील एक पुरातत्त्वीय उत्खनित स्थळ. महाराष्ट्र राज्यातील अमरावती जिल्ह्यात अमरावतीपासून ईशान्येस सुमारे ४८ किमी. अंतरावर, वर्धा नदीकाठी कौंडिण्यपूर वसले आहे. या स्थळाचे कुण्डिनपूर, कुंडिनी इ. नावांनी प्राचीन साहित्यात उल्लेख मिळतात; तसेच हे स्थळ प्राचीन विदर्भाची राजधानी असल्याचे ज्ञात होते. पुराणांतील अनेक कथांत कौंडिण्यपूर गुरफटलेले आहे. कृष्ण-रुक्मिणी, शिशुपाल, नल-दमयंती यांचा संबंध कौंडिण्यपूरशी असल्याचे अनेक कथा सांगतात. हे स्थळ भीष्मक राजाची राजधानी असून त्याची कन्या रुक्मिणी हिचे श्रीकृष्णाने गावाबाहेरील अंबिकेच्या मंदिरातून हरण केले, अशी कथा प्रसिद्ध आहे.
कौंडिण्यपूरचे पुरातत्त्वीय महत्त्व तत्कालीन न्यायाधीश ए. आर. देशपांडे यांनी सर्वप्रथम उजेडात आणले (१९२८). त्यानंतर येथील अवशेषांचा अभ्यास भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षण खात्याचे तत्कालीन महानिदेशक ⇨रावबहादूर का. ना. दीक्षित यांनी १९३६ साली, तर डेक्कन कॉलेज, पुणे येथील संशोधकांनी १९५९ साली केला. येथे पांढरीचे प्राचीन वस्त्यांचे अवशेष असलेली अनेक टेकाडे आहेत. या वस्त्यांचे स्वरूप आणि कौंडिण्यपूरचा भारतीय सांस्कृतिक परंपरेतील नामवंत व्यक्तींशी असलेला संबंध जास्त स्पष्ट करण्याच्या हेतूने उत्खनन करण्यात आले (१९६२-६४), मात्र वाङ्मयात उल्लेखिलेल्या नामवंत व्यक्तींच्या काळांतील पुरावा उत्खननात उपलब्ध झाला नाही.
महाराष्ट्र शासनाने मोरेश्वर दीक्षित यांच्या मार्गदर्शनाखाली येथे मर्यादित स्वरूपाचे उत्खनन केले (१९६२-६४). यात येथील प्राचीन लोहयुगापासून मध्ययुगापर्यंचा सांस्कृतिक कालानुक्रम निदर्शनास आला. पुढे डेक्कन कॉलेज, पुणे येथील शास्त्रज्ञांनी पायरी खड्ड्यांची पद्धती अवलंबून उत्खनन केले (२००१).
पहिल्या उत्खननात एकूण सहा कालखंडांतील वस्त्यांचा पुरावा उपलब्ध झाला. पहिला कालखंड प्राचीन लोहयुगीन महापाषाण संस्कृतीशी निगडित असून नागपूरजवळील टाकळघाट व खापा येथील संस्कृतीशी समकालीन आहे. या कालखंडाची प्राचीनता इ.स.पू. २००० इतकी ठरविली गेली होती; अर्थात हा काल इ.स.पू. आठवे -सातवे शतक इतकाच प्राचीन होऊ शकतो, असे आता निश्चित झाले आहे. या काळातील लोक उत्कृष्ट बनावटीची काळी आणि तांबडी या वर्गांची मृद्भांडी वापरीत, लोखंडाची विविध शस्त्रे व दररोजच्या वापराच्या वस्तूही बनवीत. उत्कृष्ट नक्षीकाम केलेले दगडाचे मणी तयार करीत. त्याचप्रमाणे मुशीच्या साहाय्याने तांबे शुद्ध करीत असत. दुसरी वस्ती इ.स.पू.सु. ८०० ते ६०० या काळात झाली. या कालखंडात काळी आणि तांबडी या वर्गांची मृद्भांडी चालूच राहिली, परंतु त्यात काही नवे आकार वापरात आले. तिसऱ्या कालखंडात, इ.स.पू. ३०० ते १००, कौंडिण्यपूरची भरभराट झाली होती, असे दिसते. आहतनाणी, उत्कृष्ट चमकदार काळी मृद्भांडी, दगडांचे विविध रंगांचे मणी आणि कर्णकुंडले (ताटंक चक्र) इ.वस्तू तत्कालीन वैभवाची साक्ष देतात. ही सुबत्ता यानंतरच्या, इ.स.पू.१५० ते इ.स. सु. २००, सातवाहन कालखंडातही टिकली. विटांनी बांधलेली सांडपाण्याची शोषणकुंडे, पाटे, काचेचे आणि दगडांचे विविधरंगी मणी, काचेची कर्णकुंडले, दृष्टमणी, काजळ शलाका, कंगवे, हाडांच्या सुया, लोखंडी बाणाग्रे, भाले, कट्यारी इ. या काळात प्रचलित होती. विविध प्रकारचे मणी बनविण्याचे कौंडिण्यपूर हे या काळात केंद्र होते, असे दिसते. सातवाहनांच्या काळानंतर मात्र कौंडिण्यपूरला उतरती कळा लागली. वाकाटककालीन थरांत काही अर्चनाकुंडे सापडतात,तर मध्ययुगीन काळात घरांच्या घडीव दगडांच्या भिंतींचे अवशेष आढळतात. याशिवाय मुहम्मदशाह बहमनी पहिला, औरंगजेब यांची मध्ययुगातील नाणी पांढरीच्या टेकडांवर सापडली.
२००१ साली येथे केलेल्या उत्खननात वनस्पतींच्या केसरादी अवशेषांव्यतिरिक्त अनेक थरांमध्ये गहू, वाटाणा, हरभरे, विशेषत: फोलपटांसह तांदूळ इ.जळालेल्या धान्यांचे अवशेष सापडले. तांदळाचे प्रमाण सातवाहन कालखंडात अधिक आढळून आले. अशाच प्रकारे तांदळाचे अवशेष जवळपासच्या सुमारे दहा पुरातत्त्वीय स्थळांच्या सर्वेक्षणातही मिळाल्याने प्राचीन काळी येथे मुबलक पाणीपुरवठा व अनुकूल हवामान असावे, असा निष्कर्ष काढता आला. मात्र इ.स.सहाव्या शतकानंतर हवामानात प्रतिकूल बदल होत गेला व पर्जन्यमान कमी झाले असावे.
संदर्भ:
खोलापूर हे अमरावती जिल्ह्यात अमरावतीच्या पश्चिमेस सु. २९ किमी.वर पूर्णा नदीच्या काठावर वसलेले आहे. यादव राजवंशाचा सेनापती खोलेश्वर याने खोलापूर हे गाव वसविल्याचा उल्लेख अंबेजोगाई येथील इ. स. १२२८-१२२९ च्या शिलालेखात आहे. आजचे गाव आणि त्यासभोवतालच्या परिसरात, मुख्यत्वाने नदी आणि गाव यांमधील भागात, प्राचीन वस्तीमुळे तयार झालेली पांढरी पाहावयास मिळते. १९७९-८० मध्ये नागपूर विद्यापीठाचे अजय मित्र शास्त्री आणि चंद्रशेखर गुप्त यांनी केलेल्या समन्वेषणात येथील पांढरीचा विस्तार आजच्या गावापासून नदीकाठावरील खोलेश्वराच्या मंदिरापर्यंत आढळून आला; परंतु सद्यस्थितीत यातील बरीचशी पांढरी नाहीशी झाली आहे. १९२८-२९ साली खोलापूर येथून प्राप्त रोमन बनावटीच्या मृण्मयी पदकांच्या प्रसिद्धीनंतर या स्थळाचे प्राचीनत्व सर्वप्रथम माहीत झाले. कदाचित याच आधारे कौंडिण्यपूरच्या उत्खनन अहवालातील विदर्भाच्या नकाशात खोलापूर हे सातवाहनकालीन स्थळ म्हणून दाखविण्यात आले असावे. एकोणीसशे साठच्या दशकात केलेल्या येथील उत्खननात एक तलाव आणि दोन भक्कम बांध्याच्या विहिरी (बाव) आढळल्या होत्या. पुढे नव्वदच्या दशकात व्ही. कांबळे आणि एस. नाईक यांना या ठिकाणावरून उत्तरेकडील काळ्या रंगाची झिलाईदार खापरे मिळाली. हे सर्व पुरावे येथील प्राचीन वस्तीचा विस्तार आणि काळ यांचे निदर्शक आहेत.
२००७-०८ आणि २००८-०९ या काळात डेक्कन कॉलेज, पुणे येथील भास्कर देवतारे यांनी या प्राचीन स्थळाचे उत्खनन केले. या उत्खननाचे तीन मुख्य हेतू होते: पहिला, येथील पांढरीचा कालानुक्रम समजून घेणे; दुसरा, पूर्णा आणि त्या अनुषंगाने पश्चिम विदर्भाचा प्राचीन इतिहास जाणून घेणे आणि तिसरा, येथील प्राचीन पीकपद्धतीचा अभ्यास करणे. उत्खनन आरंभ करण्यापूर्वी संपूर्ण खोलापूर सहा विभागांमध्ये विभागण्यात आले. यातील एकूण पाच ठिकाणी उत्खनन करण्यात आले. गावालगत नैर्ऋत्येला खोलापूर ते दर्यापूर मार्गावर उजव्या बाजूला जी पांढरी आहे, तिला स्थान (लोकॅलिटी) २ असे संबोधण्यात आले. येथे मिळालेल्या अवशेषांच्या आधारे इ. स. पू. चौथ्या शतकात खोलापूरला प्रथम वस्ती झाली, हे सिद्ध झाले. या स्थानाच्या वरील ५० सें.मी. स्तरातून नक्षीकाम असलेले मातीचे मणी, कर्णालंकार, त्रिरत्न पदक आणि आहत नाणे; तर साधारणत: १·०५ ते १·२ मी. खाली उत्तरेकडील काळ्या रंगाची झिलाईदार खापरे आणि त्यासोबत आहत नाणे मिळाले. २·६ ते २·८ मी. दरम्यान अर्ध-मौल्यवान दगडापासून तयार केलेले चकतीच्या आकाराचे कर्णभूषण आणि उत्कीर्णीत मुद्रा (head scratcher) मिळाली. या मुद्रेचा उपयोग काय असावा, याबाबत निश्चितपणे सांगणे शक्य नसले, तरी दोन मतप्रवाह आहेत. मोरेश्वर दीक्षित यांनी ‘डोक्यातील कोंडा काढण्यासाठी या वस्तूचा उपयोग होत असावाʼ, असे मत आपल्या त्रिपुरी उत्खनन अहवालात मांडले आहे (१९५५), तर ही मुद्रा ‘पूजा-विधीʼ वस्तू असावी, असे मत रेश्मा सावंत यांनी मांडले. येथील प्राप्त मडक्यांचे काठ व त्यांचे आकार यांच्या स्तरनिहाय अभ्यासातून १·३५ मी. आणि २·४ मी. दरम्यान त्यांच्यात लक्षणीय बदल झाल्याचे निदर्शनास आले. या सर्व पुराव्यांच्या आधारे स्थान क्र. २ येथे इ. स. पू. तिसऱ्या आणि चौथ्या शतकांत वस्ती होती असे सिद्ध झाले. २·४ मी.पेक्षा खालील पांढरीत नासपती (पेअर) या फळाच्या आकारातील मडक्यांचे काठ बहुसंख्य प्रमाणात मिळाले. अशा प्रकारची काठ असलेली मडकी उत्तर भारतात इ. स. पू. सहाव्या ते तिसऱ्या शतकांत प्रचलित होती. त्यावरून इ. स. पू. चौथ्या शतकाच्या पूर्वार्धापासूनच उत्तर भारताचा विदर्भाशी असलेला संबंध अधोरेखित होतो आणि त्या अनुषंगाने महाराष्ट्राच्या भौतिक संस्कृतीवरील प्रभाव लक्षात येतो. १·८ मी.पासून वरती विटा आणि कवेलू हे तुकड्यांच्या स्वरूपात आढळले. यावरून इ. स. पू. चौथ्या शतकाच्या उत्तरार्धात त्यांचा वापर येथे सुरू झाल्याचे सिद्ध होते. गावाच्या पूर्वेला असलेल्या पांढरीवर स्थान क्र. ५ येथेही वरील काळातील पुरावशेष प्राप्त झाले.
खोलापूर-दर्यापूर मार्गाच्या डाव्या बाजूला स्थान क्र. १ आहे. येथील पुरातत्त्वीय उत्खननातून खोलापूरपासून साधारणत: ८० किमी. पश्चिमेला असलेल्या प्राचीन भोनशी साम्य दाखविणाऱ्या वस्तू मिळाल्या. ज्यामध्ये माती, अर्धमौल्यवान दगड आणि शंख यांच्यापासून तयार केलेले मणी आणि अंगठ्या, मातीपासून तयार केलेली पदके, कर्णभूषणे, लहान आकारातील प्राणी आणि अर्चनाकुंडे, शंखापासून तयार केलेल्या बांगड्या, हाडांपासून तयार केलेली अणकुचीदार हत्यारे आणि इतर पुरातन वस्तू, तसेच ताम्र आणि लोखंडाची उपकरणे यांचा समावेश होतो. तसेच जोड साच्यांचा (double mould) वापर करून तयार केलेले मातीचे विविध आकारांतील मणी, त्रिरत्न (साधी आणि नक्षीकाम असलेली), मनुष्य आणि युग्मपदकेही मिळाली. भोन आणि खोलापूर येथील खापरांमध्ये साधर्म्य आढळून आले. या पुराव्यांच्या आधारे इ. स. पू. पहिल्या आणि दुसऱ्या शतकांत या भागात वस्ती झाल्याचे सिद्ध होते. येथे मिळालेली नाणी पूर्णत: गंजलेली असल्याने ती अभ्यासासाठी उपयुक्त ठरू शकली नाहीत. या कालखंडातील पांढरी नदीपासून बरीच जवळ आहे. पांढरीच्या नदीकडील बाजूस आणि दक्षिणेला उंच मातीचे संरक्षक कडे पाहावयास मिळतात. नदीबाजूचा कडा तुटक स्वरूपात नदीकाठाने लांबपर्यंत पसरलेला आहे; तर पूर्वेकडील जमिनीची उंची वाढत गेल्याने दक्षिणेकडील कडा काही अंतरापर्यंत जाऊन सभोवतालच्या जमिनीशी एकरूप झालेला आढळून येतो. दोन्ही कडे ज्याठिकाणी ९० अंशामध्ये मिळतात तेथे उंच मातीचे टेकाड आहे, ज्याला मालाची टेकडी म्हणून गावकरी संबोधतात. या टेकाडावरील उत्खननात वरील काळाशी संलग्न खापरे आणि विटा मिळाल्या. तसेच संपूर्ण टेकाड आणि बाजूचे कडे हे माती टाकून तयार केल्याचे दिसून आले. यावरून स्थान क्र. १ मधील वस्तीचे नदीपासून येणाऱ्या मोठ्या पुरापासून संरक्षण करण्यासाठी हे मातीचे कडे बांधल्याचे, तर मालाची टेकडी म्हणजे दूरपर्यंत नजर ठेवण्यासाठी बांधलेले बुरूज असल्याचे सिद्ध झाले.
गावाच्या दक्षिणेला मुख्य रस्त्यापलीकडे जी पांढरी आहे, तिला स्थान क्र. ६ असे संबोधण्यात आले. येथेही स्थान क्र. १ प्रमाणे मोठ्या प्रमाणात अर्धमौल्यवान दगड, मृण्मणी व पदके आणि इतर प्रकारच्या पुरातन वस्तू मिळाल्या. हस्तिदंतापासून तयार केलेल्या कंगव्याचा यामध्ये विशेष उल्लेख करावा लागेल. परंतु १ व ६ या दोन्ही स्थानांवरील नक्षीयुक्त मृण्मणी आणि पदके यांच्यात फरक आढळून येतो. सातवाहन कालखंडाशी निगडित इतर ठिकाणांहून मिळालेल्या अलंकारांशी साम्य दाखवणारे येथील मातीचे अलंकार आहेत. जोडसाच्यांमध्ये तयार केलेली मनुष्य आणि युग्मपदके येथे नाहीत. जोडसाच्यांमध्ये तयार केलेले आणि आतून पोकळ असलेले मातीच्या प्रतिमांचे अवशेष हे येथील वैशिष्ट्य म्हणावे लागेल. या पद्धतीने तयार करण्याचे तंत्रज्ञान इ. स. पहिल्या-दुसऱ्या शतकांत प्रचलित असल्याचे सर्वमान्य आहे. याआधारे वरील ठिकाणी इ. स. च्या सुरुवातीपासून ते साधारणत: तिसऱ्या शतकाच्या पूर्वार्धापर्यंत वस्ती असल्याचे सिद्ध होते.
स्थान क्र. ३ गावाच्या सीमेलगत पश्चिमेला असून येथे विटांच्या आणि मातीच्या कड्या वापरून बांधलेल्या विहिरी आहेत. नदीकाठी दोन ठिकाणी प्राचीन विटा आणि कवेलू तयार करण्याच्या अवशेषयुक्त जागा सापडल्या आहेत. प्राचीन धान्यांच्या अवशेषांमध्ये तांदूळ, गहू, उडीद, तूर इ. धान्यांचा समावेश होतो.
यावरून खोलापूरच्या वेगवेगळ्या भागांत वेगवेगळ्या कालखंडांत वस्ती झाल्याचे निदर्शनास येते. प्रारंभापासून खोलापूर हे या प्रदेशातील एक महत्त्वाचे राजकीय आणि व्यापारी केंद्र असावे. या प्राचीन स्थळावरून मध्ययुगीन नाणी आणि खापरे उपलब्ध झाली आहेत.
संदर्भ :
महाराष्ट्रातील एक प्रसिद्ध पुरातत्त्वीय स्थळ. ते नागपूर जिल्ह्यातील उमरेड तालुक्यात, नागपूरच्या आग्नेयेस सु. ७५ किमी. अंतरावर आहे. १९७३ मध्ये येथील राष्ट्रीय विद्यालयाच्या इमारतीचा पाया खोदताना मृत्तिकापात्रे व अन्य काही प्राचीन वस्तू सापडल्या. या कारणास्तव नागपूर विद्यापीठाच्या (राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ) पुरातत्त्व विभागाने शां. भा. देव यांच्या मार्गदर्शनाखाली याच ठिकाणी, राष्ट्रीय विद्यालयाच्या प्रांगणात (मांढळ-१), चाचणी खड्ड्याद्वारे येथील सांस्कृतिक क्रम शोधण्याचा प्रयत्न केला व त्यात सातवाहन काळातील अवशेष आढळले (१९७३). मात्र स्तरक्रमात हस्तक्षेप झालेला असल्याने या उत्खननाला मर्यादा होत्या. जुलै १९७४ मध्ये वनखात्यातर्फे येथे वृक्षारोपणासाठी खड्डे खणत असताना वालुकाश्माच्या लकुलिश, सदाशिव व अष्टमुखशिव अशा तीन मूर्ती सापडल्याने हे स्थळ प्रकाशझोतात आले. पुढे नागपूर विद्यापीठाच्या पुरातत्त्व विभागाने अजय मित्र शास्त्री यांच्या मार्गदर्शनाखाली १९७५-७६ व १९७६-७७ अशा दोन सत्रांमध्ये भोलाहुडकी (बीएचके-१), बोंगीहुडकी (बीएचके-२) व वऱ्हाडी तलाव (मांढळ-२) येथे विस्तृत उत्खनन केले. त्यानंतर १९८५ व १९९२ या कालावधीत महाराष्ट्र शासनाच्या पुरातत्त्व विभागातर्फे अरविंद जामखेडकर यांच्या मार्गदर्शनाखाली ‘मांढळ-२’ (वऱ्हाडी तलाव) या जागेत पुन्हा उत्खनन करण्यात आले.

राष्ट्रीय विद्यालयाच्या प्रांगणात (मांढळ-१) झालेल्या उत्खननात सांस्कृतिक क्रम सातवाहन काळ व त्यानंतरचा आहे. सातवाहनकालीन अवशेषांमध्ये खापरी शोषणकुंड (ring-well), विविध नाणी व मणी, काळी-तांबडी खापरे, कवेलू (छपरावरील कौले) इत्यादींचा समावेश आहे.
भोलाहुडकी तसेच बोंगीहुडकी येथे विटांनी बांधलेल्या वाकाटककालीन (इ. स. २५०–५५०) मंदिराचे अवशेष आढळले. तसेच वऱ्हाडी तलाव येथे आढळलेल्या मंदिराचे अवशेष वाकाटक आणि यादवकालीन असल्याचे दिसून आले. भोलाहुडकी येथील मंदिराची उभारणी १.२० मी. उंच, १८ मी. पूर्व-पश्चिम व १०.६० मी. उत्तर-दक्षिण अशा आकाराच्या चौथऱ्यावर केली होती. चौथऱ्याच्या मध्यभागी विटांनी बांधलेल्या मंदिराचे अवशेष सापडले. मंदिराच्या इतर भागाची कल्पना करता आली नाही. या मंदिराला उत्तरेकडून सोपानमार्गाने प्रवेश होता. मंदिराच्या मुख्य वास्तूपासून काही अंतरावर प्रदक्षिणामार्ग होता. मंदिराच्या ईशान्येला विटांनी बांधलेले पाण्याचे कुंड होते. याव्यतिरिक्त पुजाऱ्यांना राहण्याकरिता मंदिराच्या वायव्येला दोन निवासस्थाने होती. याच मंदिराच्या अवशेषांमध्ये एका ठिकाणी दहा शैव-वैष्णव संप्रदायाशी निगडित शिल्पसंपदा भग्न अवस्थेत एकावर-एक पुरलेली आढळली, तर दुसऱ्या ठिकाणी पहिल्याच थरात नंदिवर्धन शाखेतील वाकाटक नृपतींचे ताम्रपटांचे तीन संच सापडले. यांतील एक प्रवरसेन दुसरा याचा सोळाव्या राज्यवर्षातील, तर इतर दोन प्रवरसेन दुसरा याचा नातू पृथ्वीषेण दुसरा याच्या दुसऱ्या व दहाव्या राज्यवर्षातील आहेत. या ताम्रपटांची लिपी पेटिकाशीर्ष पद्धतीची ब्राह्मी असून भाषा संस्कृत आहे. प्रवरसेन दुसरा याच्या ताम्रपटांसोबत त्याची मोहर मांढळ येथे प्रथमच प्राप्त झाली.
बोंगीहुडकी येथे विटांनी बांधलेल्या मंदिराच्या वाकाटककालीन अवशेषांत गर्भगृह आणि मुखमंडप असलेले मंदिर उजेडात आले. हे मंदिर १४.७० मी. लांब व ११.७० मी. रुंद आकाराच्या उंच चौथऱ्यावर कल्पिले होते. गर्भगृहाची लांबी ५.६० मी. व रुंदी ४.५० मी., तर मुखमंडपाची लांबी ४ मी. व रुंदी ३.३० मी. होती. या मंदिराची एकूणच रचना भारतातील मंदिरस्थापत्याच्या इतिहासात वेगळेपण दर्शविणारी आहे.
वऱ्हाडी तलावाच्या काठावरील जागेत (मांढळ-२) नागपूर विद्यापीठाने (१९७६-७७) तसेच महाराष्ट्र शासनाने उत्खनन केले (१९८५; १९९२). या उत्खननांत शैव-वैष्णव संपद्रायाच्या मंदिराचे अवशेष आढळले. या मंदिराचे वास्तुकाम दोन काळांमध्ये झाल्याचे दिसून आले. यात पहिला काळ वाकाटक, तर दुसरा काळ यादव असल्याचे अनुमान येथील अवशेषांवरून करता आले. मंदिराची संपूर्ण व्याप्ती पूर्व-पश्चिम ११.५ मी. लांब व उत्तर-दक्षिण १० मी. रुंद आढळली. वाकाटककालीन मंदिराच्या भिंती विटांच्या असून त्या खूप रुंद होत्या व विटांचा आकार सेंमी. मध्ये ४४ सेंमी. लांब, २३ सेंमी. रुंद व ८ सेंमी. जाड होता. यादवकालीन मंदिराच्या भिंती तासून घडविलेल्या पाषाणापासून केलेल्या होत्या. दुसऱ्या काळातील मंदिर हे पहिल्या काळातील मंदिराच्या अवशेषांवर उभारले गेले होते. पहिल्या उत्खननात रोमन बनावटीशी साम्य असलेली खापरे मिळाली. यात झारीचा (स्प्रिंकलरचा) विशेष उल्लेख करता येईल. त्यानंतर झालेल्या उत्खननात प्रामुख्याने प्रतिहार व सिंह यांच्या प्रतिमा आढळल्या. या शिल्पसंपदेव्यतिरिक्त काही स्त्री-प्रतिमांचे अवशेष निदर्शनास आले. या स्त्री-प्रतिमांची अजिंठा येथील गंगा-यमुना शिल्पांशी तुलना करता येऊ शकेल, अशा त्या आहेत. येथे सापडलेल्या शिल्पांच्या तसेच शिवलिंगाच्या आधारावर या मंदिराच्या उभारणीचा काळ चौथ्या शतकातील शेवटच्या चतुर्थकापासून ते पाचव्या शतकातील पहिल्या चतुर्थकापर्यंत असल्याचे अनुमान केले गेले.
भोलाहुडकी (बीएचके-१) येथील उत्खननात शैव/वैष्णव संप्रदायांच्या शिव, महासदाशिव (द्वादशमुख), संकर्षण, ब्रह्मा, विष्णु, नैगमेष, पार्वती, गणेश व दुर्गा या मूर्ती; तर उत्खननापूर्वी वृक्षारोपणाकरिता खड्डे खोदताना अवचित सापडलेल्या मूर्तींमध्ये अष्टमुखी शिव, सदाशिव, लकुलिश इत्यादींचा समावेश होता. या सर्व मूर्ती शैव संप्रदायाच्या पाशुपत या पंथातील असून त्या वाकाटककालीन आहेत. या वैशिष्ट्यपूर्ण मूर्ती ठेंगण्या यक्षमूर्तीच्या धर्तीवर घडविल्या आहेत. तौलनिक कालमापनानुसार त्यांचा काळ इ. स. ३५० ते ४०० असा निश्चित करण्यात आला आहे. वाकाटक कला व स्थापत्यविषयाचे पाश्चिमात्य अभ्यासक हन्स बाकर यांनी अष्टमुख शिवाची मूर्ती वऱ्हाडी तलाव (मांढळ-२) येथील प्रमुख देवता; तर द्वादशमुख शिवाची मूर्ती ही भोलाहुडकी येथील मंदिराची प्रमुख देवता असल्याचा तर्क केला आहे. तसेच मांढळ येथे आतापर्यंत उजेडात आलेल्या वाकाटक काळातील तीन मंदिरांमधील दोन मंदिरे ही शैव संप्रदायाची असावीत, असेही अनुमान केले आहे.
संदर्भ :
वाशिम जिल्ह्यातील मंगरुळपीर तालुक्यात (पूर्वीच्या अकोला जिल्ह्यातील मंगरूळ तालुक्यात) स्थित तऱ्हाळे गावात सप्टेंबर १९३९ मध्ये एका शेताजवळून वाहणाऱ्या नाल्याशेजारी जमिनीमध्ये गाडलेले एक मृद-भांडे सापडले. या मृदभांड्यात जवळपास १६०० सातवाहनकालीन नाण्यांचा संचय प्राप्त झाला. तत्कालीन ट्रेजर ट्रॉव्ह ॲक्ट अंतर्गत त्या काळातील प्रांतिक सरकारने सदर निधी ताब्यात घेतला व मध्यवर्ती वस्तुसंग्रहालय, नागपूर यांच्याकडे पाठविला.
विदर्भामध्ये सापडलेला सातवाहनकालीन नाण्यांचा हा दुसरा महत्त्वाचा नाणेसंचय आहे. यापूर्वी चंद्रपूर जिल्ह्यातील ब्रह्मपुरी येथे सापडलेला चांदा नाणेनिधी म्हणून प्रसिद्ध असलेला नाणेसंचय आढळून आला. तऱ्हाळे नाणेसंचयाचे संशोधन व प्रकाशन सर्वप्रथम वा. वि. मिराशी यांनी केले.
नाणेसंचयाचे वर्णन : नाणेसंचयातील १६०० नाण्यांपैकी १५२५ नाणी पूर्ण आकाराची तर, ७५ नाण्यांचे तुकडे आढळून आले. सर्व नाणी केवळ सातवाहन नृपतींची होती. परदेशी राजवंशाचे (उदा., रोमन) एकही नाणे नव्हते, हे या नाणेसंचयाचे वैशिष्ट्य. प्राप्त नाणी पोटीन या मिश्र धातूची (तांबे व शिसे या धातूंचे मिश्रण) होती. तथापि निरनिराळ्या नाण्यांमध्ये तांबे व शिसे यांचे प्रमाण वेगवेगळे असल्याचे आढळून आले. काही नाणी शिसे या धातुप्रमाणे काळी तर काही तांब्याप्रमाणे तांबड्या चकचकीत रंगाची असल्याचे दिसून आले.
नाण्यांचे वर्णन : संचयातील सर्व नाणी एकाच प्रकारची व गोलाकार आहेत. त्यांच्या दर्शनी भागावर सोंड उंचावलेला हत्ती व गोलाकार कडेवर व ब्राह्मी लिपीत व प्राकृत भाषेत राजाचे नाव सांगणारा लेख तर मागील बाजूवर उज्जैन चिन्ह आहे. उज्जैन चिन्हाच्या चार बाजूंवरील मोठ्या वर्तुळांमध्ये एक लहान वर्तुळ (वर्तुळात वर्तुळ) आहे. काही वर्तुळांच्या वरच्या बाजूला चंद्रकोर आहे.
कर्ण सातकर्णी या राजाची नाणी वगळता उर्वरित नाण्यांवर दर्शनी भागावरील हत्तीचे तोंड उजवीकडे आहे. कर्ण सातकर्णीच्या नाण्यांवर मात्र हत्तीचे तोंड डावीकडे आहे, असे निरीक्षण मिराशींनी नोंदविले आहे. काही नाण्यांची चकती (planchet) लेखाच्या ठशापेक्षा लहान असल्यामुळे बऱ्याच नाण्यांवर लेख अपूर्णावस्थेत आहेत. नाणी वजनाने हलकी असून वजनांमध्ये मोठ्या प्रमाणावर वैविध्य आढळते. प्राप्त नाण्यांचे नृपतीनिहाय वर्णन पुढीलप्रमाणे :
गौतमीपुत्र सातकर्णी : नाण्यांची संख्या – ५७३. निधीतील सर्वाधिक नाणी या नृपतीची आढळतात. नाण्यांवर सिरि सातकणिस किंवा सिरि सातकणि हे लेख आढळतात. नाण्यांचे वजन – ३१- ६० ग्रेन्स दरम्यान.
वाशिष्ठिपुत्र पुळुमावी : नाण्यांची संख्या – १७४. नाण्यांवर रञो सिरि पुळुमाविस अशा प्रकारचा लेख आढळतो. नाण्यांचे वजन : ४० – ४५ ग्रेन्स दरम्यान.
चौथा सातकर्णी : नाण्यांची संख्या – ३५. नाण्यांवर सिव सिरी सातकणिस असा लेख आढळतो. नाण्यांचे वजन : २६ – ३८ ग्रेन्स दरम्यान.
शिवश्री पुळुमावी : नाण्यांची संख्या – ३२. नाण्यांवररञो सिव सिरि पुळुमाविस अशा प्रकारचा लेख आढळतो. नाण्यांचे वजन : ३७ – ५० ग्रेन्स दरम्यान.
स्कंद सातकर्णी : नाण्यांची संख्या – २३. नाण्यांवर (रञो) सिरि खद सातकणिस असा लेख दिसतो. नाण्यांचे वजन : ५० – ५२ ग्रेन्स दरम्यान.
यज्ञ सातकर्णी : नाण्यांची संख्या २४८. नाण्यांवर रञो सिरि यञ सातकणिस असा लेख आढळतो. नाण्यांचे वजन : ३१ – ४५ ग्रेन्स दरम्यान.
विजय सातकर्णी : नाण्यांची संख्या : ४. नाण्यांवर (सिरि) विजय सातकणिस असा लेख आढळतो. नाण्यांचे वजन : ४० – ५० ग्रेन्स दरम्यान.
कुंभ सातकर्णी : नाण्यांची संख्या : ५६. नाण्यांवर (रञो) सिरि कुभ सातकणिस असा लेख आढळतो. नाण्यांचे वजन : सरासरी ३० ग्रेन्स.
कर्ण सातकर्णी : नाण्यांची संख्या – ७. नाण्यांवर सिरि कण सातकणिस हा लेख आहे. नाण्यांचे वजन : ३० – ३६ ग्रेन्स दरम्यान.
शक सातकर्णी : नाण्यांची संख्या – ४. नाण्यांवर सिरि सक किंवा सकस सातकणिस असा लेख दिसतो. नाण्यांचे वजन : ३४ – ३७ ग्रेन्स दरम्यान.
श्री पुळुहामवी : नाण्यांची संख्या – ४. नाण्यांवर (रञो सिरि) पुळुहामविस हा लेख आहे. नाण्यांचे वजन : ४० – ५१ ग्रेन्स दरम्यान.
याशिवाय ज्या नाण्यांवरचे लेख वाचता येत नाहीत, अशा नाण्यांची संख्या ३६५ एवढी आहे.
नाणेसंचयाचे महत्त्व : चांदा नाणेनिधी प्रमाणेच नंतरच्या काळात सापडलेला तऱ्हाळे नाणेसंचय सातवाहनांच्या इतिहासाच्या अभ्यासाच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचा स्रोत ठरतो. आतापर्यंत सापडलेल्या सातवाहनकालीन नाणेसंचयामध्ये हा नाणेसंचय मोठा आहे. उत्तर सातवाहन काळातील सातवाहन नृपती व त्यांचा कालक्रम ठरविण्यासाठी या नाणेसंचयाची मदत होते. हत्ती व उज्जैन छापाची नाणी विदर्भात चलनात होती, हे या संचयामुळे सिद्ध होते. पुराणात वर्णन केलेल्या अनेक सातवाहन राजांची नाणी प्रथमच या नाणेसंचयाद्वारे प्राप्त झाली. तसेच पुराणात उल्लेख नसलेल्या काही राजांची नाणीदेखील या संचयामुळे प्रकाशात आली. सातवाहन राजवंशाच्या अगदी शेवटच्या काळात सातवाहनांची सत्ता विदर्भापुरती मर्यादित असल्याचे पुरावे या नाणेनिधीमुळे प्राप्त झाले.
संकेतशब्द : तऱ्हाळे, वाशिम, अकोला, सातवाहन, वा. वि. मिराशी, चांदा, गौतमीपुत्र सातकर्णी, वाशिष्ठिपुत्र पुळुमावी, सातकर्णी चौथा, शिवश्री पुळुमावी, स्कंद सातकर्णी, यज्ञ सातकर्णी, विजय सातकर्णी, कुंभ सातकर्णी, कर्ण सातकर्णी, शक सातकर्णी, पुळुहामवी, विदर्भ
संदर्भ :
अजिंठा हे महाराष्ट्रातील प्राचीन लेणी, शैलगृहे व भित्तिचित्रे यांचे एक जगप्रसिद्ध स्थळ. ते औरंगाबाद जिल्ह्यात उत्तरेस सु. १०३ किमी. अंतरावर आहे. येथे एकूण तीस बौद्धधर्मीय लेणी (गुंफा) असून यांपैकी क्र. ९, १०, १९, २६ व २९ ही चैत्यगृहे व बाकीचे पंचवीस विहार आहेत. कालखंडाच्या दृष्टीने या लेण्यांपैकी ९ व १० ही चैत्यगृहे आणि ८, १२, १३ व ३० हे विहार हीनयान पंथाचे असून त्यांचा काल इ. स. पू. २ रे शतक ते इ. स. २ रे शतक असा आहे. बाकीची लेणी महायान पंथाची असून येथील अवशिष्ट शिलालेखांवरून असे दिसून येते की, ती वाकाटक वंशातील शेवटचा ज्ञात सम्राट हरिषेण ह्याच्या कारकिर्दित (सु. ४७५–५००) कोरली गेली असावीत. येथे सातवाहन काळातील लयन स्थापत्याच्या पहिल्या टप्प्यात, सामान्य व्यक्तींनी आपल्या ऐपतीप्रमाणे चैत्य आणि बौद्धविहारांसाठी अनेक घटकांचे दान दिलेले दिसते. दुसऱ्या टप्प्यात, महायान काळात मात्र प्रामुख्याने वाकाटकनृपती यांच्या राजाश्रयातून हे लयन स्थापत्य उभे राहिलेले दिसते. येथील गुंफा क्र. १६, १७ आणि २० येथील शिलालेख हरिषेण याच्या राज्यकालादरम्यानचे आहेत. हे लेख राजा हरिषेण याचे सामंत आणि मंत्री यांचे आहेत.
गुंफा क्र. १६ : (वराहदेवाचा लेख).
या लेखाचा शोध इ. स. १८६२ मध्ये प्राच्यविद्यापंडित भाऊ दाजी लाड यांनी लावला व त्याचे सर्वप्रथम वाचन केले. त्यानंतर स्कॉटिश पुरातत्त्वज्ञ जेम्स बर्जेस आणि भारतविद्याविशारद भगवानलाल इंद्रजी यांनी १८८१ मध्ये, प्राचीन भारतीय लिपींचे जर्मन अभ्यासक योहान गेओर्ख ब्यूलर (Johann Georg Buhler) यांनी १८८३ मध्ये आणि प्राच्यविद्यासंशोधक वा. वि. मिराशी यांनी १९४१ मध्ये या लेखाचे पुनर्वाचन केले.
प्रस्तुत लेख वत्सगुल्म शाखेतील वाकाटक नृपती हरिषेण याचा मंत्री वराहदेव याचा आहे. गुंफेच्या व्हरांड्याच्या एका टोकाला डावीकडील भिंतीवर दक्षिणी पद्धतीच्या पेटिकाशीर्ष ब्राह्मीलिपीत संस्कृत भाषेत हा लेख कोरलेला असून संपूर्ण लेख पद्यात आहे. मात्र यात देवटेक येथील लेखाप्रमाणे डोक्यावरील पेटिका पूर्णपणे खोदल्या आहेत. या लेखाच्या २७ ओळी असून त्यात ३२ पद्ये आहेत. लेख खूपच झिजला आहे. विशेषत: आठव्या ओळीपर्यंतचा मध्यभाग व डाव्या बाजूकडील अक्षरे वाचता येत नाहीत.
या लेखाचे मुख्यत: दोन भाग आहेत. पहिल्या भागात वाकाटक राजा हरिषेण याची त्या वंशाचा मूळ पुरुष राजा विंध्यशक्तीपासूनची वंशावळ दिली आहे. त्याला ‘द्विजʼ (ब्राह्मण) म्हणून गौरविले आहे. देवसेन आणि हरिषेण यांचे मंत्री हस्तिभोज आणि पुत्र वराहदेव यांचे वर्णन केले आहे. हस्तिभोज हा कुशल मंत्री आणि गजदळाचा अधिपती असून देवसेनाने निर्धास्तपणे त्याच्या हाती राज्यकारभाराची धुरा सोपवली होती. हरिषेणाच्या वर्णनादरम्यान कुंतल, अवंती, कलिंग, कोसल, त्रिकुट, लाट आणि आंध्र या प्रांतांची नावे आली आहेत. या ठिकाणी लेख भग्न झाला आहे. बहुधा हरिषेणाने जिंकलेल्या राज्यांची ती यादी असावी.
लेखाच्या दुसऱ्या भागात चैत्यमंदिर, मंडपरत्न, पाण्याची विशाल टाकी आणि नागराजाचे मंदिर (नागेंद्र वेश्मा) इ. बौद्धसंघाला अर्पण केल्याचा उल्लेख आहे. या दानाचे पुण्य आपल्या मातापित्यांना मिळावे, अशी इच्छा त्याने व्यक्त केली आहे.
अजिंठ्यापासून सु, १५ किमी. अंतरावर पश्चिमेस गुळवाडा येथे घटोत्कच गुंफा आहेत. येथे एक अठरा ओळींचा शिलालेख आहे. अक्षरांची धाटणी अजिंठा येथील १६ आणि १७ क्रमांकांच्या लेखांप्रमाणेच आहे. हा विहारदेखील वराहदेवानेच निर्माण केला होता. विशेष म्हणजे या लेखातून आपल्याला त्याच्या कुळाबद्दल सविस्तर माहिती मिळते. वराहदेव हा वाल्लूर येथील ब्राह्मण होता. यज्ञपति हे त्याच्या मूळ पुरुषाचे नाव होते. लेखात उल्लेख केलेले त्याचे सर्व पूर्वज वाकाटक राजांचे मंत्री असल्याचीही नोंद आहे.
वा. वि. मिराशी यांच्या मते, सन १९३६ मध्ये वाशीम ताम्रपट मिळेपर्यंत या वत्सगुल्म शाखेविषयी मुळीच माहिती नव्हती. या शाखेच्या कित्येक नृपतींची नावे अजिंठा येथील सोळा क्रमांकाच्या लेण्यातील लेखात आली आहेत; तथापि तो लेख अत्यंत खराब झाल्यामुळे त्यातील नावे बरोबर वाचता आली नव्हती. वाशीम ताम्रपटांतील माहितीवरून अजिंठा लेखातील खरी राजनामे उपलब्ध झाली आहेत. त्यावरून इंध्याद्री पर्वतराजीच्या दक्षिणेस वाकाटकांची दुसरी शाखा राज्य करीत होती, हे सिद्ध झाले आहे.
गुंफा क्र. १७ : (हरिषेणाच्या मांडलिकाचा लेख).
प्रस्तुत लेख गुंफेच्या व्हरांड्याच्या भिंतीवर कोरला आहे. हा लेख संस्कृत पद्यात असून त्यात २९ वृत्तबद्ध श्लोक आहेत. लिपी दक्षिणी पद्धतीची पेटीकाशीर्ष ब्राह्मी आहे. हा लेख प्रथम १८६३ मध्ये भाऊ दाजी लाड यांनी वाचला. त्यानंतर भगवानलाल इंद्रजी यांनी १८८३ मध्ये त्याचे पुनर्वाचन प्रसिद्ध केले. हा लेख अनेक ठिकाणी खंडित असल्याने त्याच्या अर्थपूर्ण वाचनात अडचणी येतात. ज्या राजाने हा लेख कोरविला होता, त्याचे नाव आता नष्ट झाले आहे. पण तो वाकाटकनृपती हरिषेणाचा मांडलिक असून बहुधा खानदेशावर राज्य करीत असावा, असे वा.वि. मिराशी यांनी प्रतिपादले आहे.
भगवानलाल इंद्रजी यांनी या लेखात अश्मक देशाच्या धृतराष्ट्र, हरिसांब, शौरिसांब, उपेंद्रगुप्त, प्रथम कच, भिक्षुदास, निलदास, द्वितीय कच, कृष्णदास व त्याचे पुत्र (नाव नाहीसे झाले आहे) आणि रविसांब या राजांच्या नावांचे वाचन केले. हे राजे वाकाटकांचे मांडलिक असावेत.
योहान गेओर्ख ब्यूलर यांच्या मते, ‘रविसांबʼ या आपल्या धाकट्या भावाच्या अकाली मृत्युमुळे त्याला ऐहिक जगाची नश्वरता समजली. मिराशी यांच्या मते, हाच राजा हरिषेण याचा मांडलिक असावा. गुंफा क्र. १७ येथील विहार आणि क्र. १९ येथील गंधकुटी निर्माण करणाऱ्या या राजाचे नाव नष्ट झाले आहे. जेतवनातील गौतम बुद्धाच्या निवासस्थानाला ‘गंधकुटीʼ असे म्हणत असत. प्रस्तुत लेखातही वाकाटक राजा हरिषेण याचा उल्लेख आल्याने हा लेख गुंफा क्र. १६ चा समकालीन असावा.
गुंफा क्र. २० : (उपेंद्रगुप्त याचा लेख).
जेम्स बर्जेस यांनी गुंफा क्र. २० येथील व्हरांड्यातील डाव्या भागाला एका अर्धस्तंभावर असलेल्या खंडित लेखात क्रि (खंडित अक्षरे) याचा पुत्र उपेंद्र (खंडित अक्षरे) याने मंडपाचे दान दिल्याची नोंद केली आहे. गुंफा क्र. १७ मधील लेखाच्या आधारे वॉल्टर एम. स्पिंक यांनी यातील पिता कृष्णदास असून त्याच्या मुलाचे नाव उपेंद्रगुप्त असल्याचे अनुमान केले आहे. कचप्रमाणे उपेंद्रउगुप्त हे नावदेखील या घराण्यात पुन्हा आले असण्याची शक्यता त्यांनी वर्तविली आहे. यावरून गुंफा क्र. १७ आणि २० यांचा दानकर्ता उपेंद्रगप्त असावा, असे त्यांचे मत आहे.
आभिरांच्या आक्रमणामुळे वाकाटक राजघराणे अस्तंगत झाले. याचा प्रभाव अजिंठा येथे गुंफा क्र. २६ मधील लेखाच्या दाखल्यावरुन दिसून येतो. या लेखात संस्कृत भाषेतील सत्तावीस श्लोक आहेत. बर्जेस आणि इंद्रजी यांच्या मते, लेखातील ब्राह्मी लिपीची अक्षरवाटिका गुंफा क्र. १७ च्या काळानंतरची आहे. या लेण्याची देणगी मुनी स्थविराचल व भिक्षू बुद्धभद्र यांनी दिली आहे. भिक्षू बुद्धभद्र याने ही गुंफा आपला मित्र भव्विराज या अश्मक राजाच्या मंत्र्याच्या सन्मानार्थ दान दिल्याचा उल्लेख आहे. पाचव्या शतकाच्या अखेरच्या दशकापर्यंत आभिरांनी अजिंठ्याच्या परिसरात आपले वर्चस्व प्रस्थापित केल्याचा हा दाखला आहे.
संदर्भ :
महाराष्ट्रातील एक प्रसिद्ध पुरातत्त्वीय स्थळ. ते नागपूर जिल्ह्यातील रामटेक तालुक्यात नागपूर शहराच्या ईशान्येस ४० किमी. आणि रामटेकच्या दक्षिणेस ६ किमी. अंतरावर वसले आहे. येथील प्राप्त पुरातत्त्वीय अवशेष आणि अभिलेखीय संपदा लक्षात घेऊन नगरधन हे वाकाटक राजवंशाच्या राजधानीचे शहर प्राचीन नंदिवर्धन असावे, अशी शक्यता पुरातत्त्वज्ञ रावबहादूर हिरालाल यांनी सर्वप्रथम व्यक्त केली. प्राच्यविद्यासंशोधक वा. वि. मिराशी यांनीही यावर शिक्कामोर्तब केले.

इ. स. ३५० च्या दरम्यान वाकाटकसम्राट पृथिवीषेण यांनी वाकाटक साम्राज्याची राजधानी पद्मपूरवरून नंदिवर्धनला स्थलांतरित केल्याचा उल्लेख ताम्रपटातून प्राप्त होतो. वाकाटक कालखंडात नंदिवर्धनहून ११ ताम्रपट पारित केले होते. वाकाटक सम्राज्ञी प्रभावती गुप्ताच्या राज्यकाळाच्या तेराव्या वर्षी पारित केलेल्या पुणे ताम्रपटात नंदिवर्धनचा उल्लेख सर्वप्रथम आढळून येतो. सम्राट प्रवरसेन दुसरा याच्या उत्तरार्धात राजधानी नंदिवर्धनहून प्रवरपूर (पवनार-वर्धा) येथे स्थलांतरित झाल्याचे दिसून येते. त्या संदर्भात एकट्या दुसऱ्या प्रवरसेनाचे दहा-बारा ताम्रपट सापडले आहेत. वाकाटक कालखंडांनंतरसुद्धा नल आणि राष्ट्रकूट राजवंशांनीही नंदीवर्धनवरून ताम्रपट पारित केल्याचे दिसून येते. येथे दक्षिणस्थित असलेल्या किल्ल्याचे गोंडराजवटीत बांधकाम झाले असून भोसलेराजवटीत किल्ल्याचे नूतनीकरण करण्यात आले. भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षण, नागपूर विद्यापीठ आणि महाराष्ट्र राज्य पुरातत्त्व आणि वस्तुसंग्रहालये संचालनालय यांनी १९८०–८५ च्या दरम्यान येथे केलेल्या पुरातत्त्वीय समन्वेषणात ऐतिहासिक कालखंडातील मृद्भांडी आणि शिल्पावशेष सापडले आहेत.

वाकाटक ताम्रपटांत वर्णित नंदिवर्धन हेच सध्याचे नगरधन आहे, याची पुरातत्त्वीय दृष्ट्या उकल करण्यासाठी, तसेच वाकाटक कालखंडातील वसाहतीक रचना आणि नगररचनेवर प्रकाश टाकण्यासाठी नगरधनचे उत्खनन केले गेले (२०१५-१८). महाराष्ट्र राज्य पुरातत्त्व आणि वस्तुसंग्रहालये संचालनालय, नागपूर विभागाचे विराग सोनटक्के, डेक्कन कॉलेज अभिमत विद्यापीठाचे श्रीकांत गणवीर आणि शंतनू वैद्य यांच्या निदर्शनाखाली या स्थळाचे संयुक्तपणे विस्तृत उत्खनन केले गेले.
या प्राचीन स्थळाची व्याप्ती साधारणत: १·५ किमी. क्षेत्रात पसरली आहे. सहा सांस्कृतिक कालक्रम नगरधनच्या उत्खननातून उजेडात आले आहेत, ज्यात पहिला कालखंड प्रारंभिक लोहयुगाशी निगडित असून दुसरा मौर्य आणि सातवाहनपूर्व काळ, तिसरा सातवाहन आणि क्षत्रप काळ, चौथा वाकाटक, पाचवा पूर्वमध्ययुगीन कालखंड आणि सहावा मध्ययुगीन कालखंड आहे. या उत्खननात प्रामुख्याने काळी-तांबडी, तांबडी, लाल लेपयुक्त, काळी अशा विविध रंगांतील मृद्भांडी आणि पाणतीराकृती (टॉरपिडो) कुंभ आदी अवशेष सापडले. किल्ल्यात केलेल्या उत्खननात वाकाटक कालखंडातील भव्य भिंतीचे अवशेष सापडले, जे राजप्रासाद किंवा राजकीय आश्रयातून निर्मित भव्य वास्तूचे अवशेष असण्याची शक्यता आहे. उत्खननात नागरी वसाहतीचे पुरावे प्राप्त झाले असून घरांची रचना सामान्य आहे. प्रामुख्याने घरांचा जोता विटांनी बांधलेला आहे. भिंती कुडाच्या असून विटांनी आच्छादित केल्या होत्या. गावाच्या पश्चिमेस असलेल्या कोटेश्वर देवस्थानाजवळ वाकाटक काळातील प्राचीन बंधाऱ्याचे अवशेष आढळून आले. यावरून येथील प्राचीन जलव्यवस्थापन पद्धतीवर प्रकाश पडतो.
सातवाहन, क्षत्रप, वाकाटक, विष्णुकुंडीन, इंडो-ससॅनियन आणि बहमनी या राजवंशांची नाणी उत्खननात प्राप्त झाली आहेत. वाकाटक राजवंशाची नाणी स्तरीय संदर्भातून प्राप्त झाली आहेत. या उत्खननात वाकाटक सम्राज्ञी प्रभावती गुप्ताची मुद्रा आढळून आली (२०१५-१६). ही मुद्रा सर्वांत उल्लेखनीय प्राचीन वस्तू होय. या मुद्रेवर पेटिका-शीर्ष ब्राह्मी लिपीत प्रभावती गुप्ताचे नाव लिहिले असून मुद्रेच्या वरील भागात शंखाचे अंकन केलेले आहे. घरगुती पूजेकरिता तयार केलेल्या मृण्मय लघु अर्चना देवालयाचे (terracotta miniature votive shrine) अवशेष आणि शंख, पद्म आदी धार्मिक प्रतिकांचे अंकन असणाऱ्या चौरस आकाराचे छोटे दगडी फलक या येथील महत्त्वपूर्ण प्राचीन वस्तू आहेत. नगरधनच्या उत्खननात प्राप्त धार्मिक प्रतिमांत नरसिंह, विष्णु, गणपती, योगेश्वरी, नैगमेषी, लज्जागौरी आदींच्या प्रतिमांचा प्रामुख्याने समावेश होतो.
येथील उत्खननादरम्यान ॲश्युलियन हत्यारे सापडल्याने या स्थळाची प्राचीनता प्रागैतिहासिक कालखंडापर्यंत गेली आहे. तसेच नागरी, सार्वजनिक आणि प्रशासकीय जीवनाशी संबंधित बांधकामाचे महत्त्वपूर्ण अवशेष येथे सापडले. एकूणच नगरधन येथील उत्खनन आणि समन्वेषण यांतून प्रागैतिहासिक कालखंडापासून मध्ययुगीन कालखंडापर्यंतच्या सांस्कृतिक कालक्रमाबाबत महत्त्वपूर्ण माहिती उपलब्ध झाली.
संदर्भ :
महाराष्ट्रातील एक जिल्ह्याचे ठिकाण आणि प्रसिद्ध पुरातत्त्वीय स्थळ. वत्सगुल्म, वत्स्यगुल्म, वासिम, वंशगुल्म इत्यादी नावांनीही त्याचा उल्लेख आढळतो. महाभारत, वात्स्यायनाचे कामसूत्र, पद्मपुराण, राजशेखरची काव्यमीमांसा, वत्सगुल्ममाहात्म्य इ. प्राचीन ग्रंथांतून तसेच वत्सगुल्म शाखेतील वाकाटक घराण्याच्या कोरीव लेखांतून वत्सगुल्मचा उल्लेख आहे. वत्सऋषींची तपोभूमी म्हणून ते विख्यात आहे. पौराणिक कथेनुसार येथील पद्मतीर्थात वासुकी ऋषीने प्रथम स्नान केले, म्हणून त्यास ‘वासुकी नगरʼ असेही नाव मिळाले. त्या शब्दाचे अपभ्रंश रूप ‘वाशिमʼ हे मुस्लिम राजवटीत रूढ झाले असावे. वाकाटकांच्या काळात वाशिम हे साहित्यिक घडामोडींचे महत्त्वाचे केंद्र होते. प्राकृत भाषेची ‘वच्छोमीʼ (वत्सगुल्मी) ही साहित्यशैली येथेच विकसित व लोकप्रिय झाली. वाकाटक राजवटीनंतर मात्र वत्सगुल्मचे महत्त्व ओसरले.
वाशिमचा प्राचीन इतिहास सुस्पष्ट नाही; तथापि वाकाटक घराण्याच्या एका शाखेची येथे राजधानी होती. या घराण्यातील राजांनी ३३०-५५० पर्यंत सभोवतालच्या भूप्रदेशांवर राज्य केले. नवव्या शतकातील राजशेखर कवीने या शहराला विद्या, कला व संस्कृती यांचे केंद्र म्हटले आहे. येथे काही वर्षे राष्ट्रकूट व नंतर यादव (१२१०-१३१८) घराण्यांची सत्ता होती. मोगल काळात (१५३०-१७५७) ते हैदराबादच्या निजामाच्या अखत्यारित होते. पुढे मराठे, पेशवे आदी सत्तांनी हा भाग ताब्यात ठेवला.
वाकाटक नृपती दुसरा विंध्यशक्ती याचा ताम्रपट १९३९ साली सापडल्यानंतर वाशिम पुन्हा प्रकाशझोतात आले. हा ताम्रपट ‘वत्सगुल्मʼ येथून राजाच्या ३७ व्या राज्यवर्धापनवर्षी देण्यात आला होता. वत्सगुल्म म्हणजेच वाशिम ही सुरुवातीपासून शेवटपर्यंत वाकाटकांच्या पश्चिम शाखेची राजधानी होती. या पार्श्वभूमीवर १९९२-९३ व १९९४-९५ मध्ये महाराष्ट्र शासनाच्या पुरातत्त्व आणि वस्तुसंग्रहालये विभाग, नागपूर यांच्यातर्फे येथे गवेषण, उत्खनन करण्यात आले. हे उत्खनन फुकतपुरा येथील चामुंडेश्वरी मंदिरासमोर सर्वेक्षण क्र. २५६, श्री. इंगळे यांच्या शेतात आणि जैन क्षेत्रपालाचे आधुनिक देऊळ असलेल्या ‘लाला देऊळʼ अशा दोन ठिकाणी करण्यात आले.
श्री. इंगळे यांच्या शेतात केलेल्या उत्खननात १४×१२ मी. मापाचे अंडाकृती बांधकाम सापडले. या बांधकामासाठी भट्टीत भाजलेल्या विटा वापरल्या होत्या. या बांधकामाच्या केंद्रस्थानी विटांनी बांधलेला चौरस असून मध्यभागी एक अष्टकोनी खळगा आहे. हा बहुधा शिवलिंगाच्या शाळुंकेला आधार देण्यासाठी असावा. प्रत्येक कोपऱ्यात तारकाकार साधण्यासाठी इंग्रजी ‘एलʼ आकाराच्या भाजक्या विटांचा वापर केलेला दिसतो. समोर मंडपाचा चौथरा आहे. याशिवाय खापरे, मणी, मातीच्या मूर्ती व इतर वस्तू, लोखंडी वस्तू तसेच वाकाटक व क्षत्रप घराण्यांची नाणी सापडली. याच ठिकाणी शेतात उमा-महेश्वराची व शंखनिधीची प्रतिमा आढळली.
१९९४-९५ मध्ये लाला देऊळ या ठिकाणी उत्खनन करण्यात आले. हे उत्खनन ८०×८० मी.हून थोडे अधिकच मोठे होते. या उत्खननात १ मी. जाडीची प्राकाराची भिंत सापडली. ती सुमारे ७० मी. पूर्वपश्चिम धावत होती. या भिंतीला लागून इतरही काही बांधीव अवशेष सापडले. त्यांपैकी एक बांधकाम अंडाकार असून त्याच्या केंद्रभागातील अष्टकोनी बांधकाम वगळता ते पहिल्या उत्खननात मिळालेल्या बांधकामाशी तंतोतंत मिळतेजुळते होते. या टेकाडाच्या नैऋत्येस एका साध्या तारकाकृती पायावर बेतलेले अंडाकार बांधकाम सापडले. या बांधकामाला देवकोष्ठाची रचना केली होती. तीर्थकुंडाजवळ अष्टकोनी गर्भगृह व आयताकार मुखमंडप होता. इतर अवशेषांमध्ये लघुरूप मृत्तिकास्तंभ महत्त्वाचे आहेत. हे स्तंभ विटांप्रमाणेच भट्टीत भाजलेले आहेत. त्यांचे अजिंठा येथील भित्तिचित्रांत आढळणाऱ्या खांबांशी साधर्म्य आहे. या व्यतिरिक्त तवली, तोटीचे भांडे आणि घडवंचीवरील थाळी या महत्त्वाच्या मृण्मयी वस्तू आहेत. लाल लेपन केलेल्या मृदभांड्यांची पातळ नकली आवृत्ती वाशिम येथे सापडली. तसेच येथे सापडलेल्या नाण्यांचे हमलापुरी येथील नाण्यांशी साम्य आहे.
संदर्भ :
महाराष्ट्रातील एक प्राचीन ऐतिहासिक व पुरातत्त्वीय स्थळ. ते भंडारा जिल्ह्यात नागपूर-भंडारा मार्गावर नागपूरच्या आग्नेयेस सु. ८० किमी.वर वैनगंगा नदीच्या उजव्या तीरावर वसले आहे. शुंग-सातवाहन काळातील बौद्ध धर्माचे केंद्र, तसेच वाकाटक काळातील एक महत्त्वपूर्ण स्थळ म्हणून पौनी प्रसिद्ध आहे.
पौनी येथील पुरावशेष सर्वप्रथम पुरातत्त्वज्ञ हेन्री कझिन्स (१८७९), नंतर भारतीय पुरातत्त्व खात्याचे संचालक सर जॉन मार्शल यांच्या निदर्शनास आले (१९२६). पुरातत्त्वज्ञ एच. हरग्रीव्ह्ज यांनी पौनी येथील किल्ल्याची प्रेक्षणीय तटबंदी, बुरूज व खंदक यांचे वर्णन केल्याचे आढळते (१९२७). येथील पुरावशेषांचे महत्त्व लक्षात घेऊन तत्कालीन शासनाने पौनी येथील किल्ला व आसपासचे पुरावशेष संरक्षित म्हणून घोषित केले. भारतीय पुरातत्त्व विभागाचे मध्य भारतातील साहाय्यक पर्यवेक्षक जे. सी. चंद्रा यांनी पौनी येथे मोठ्या प्रमाणावर पुरावशेष, विशेषत: स्तूपाचे अवशेष, असावेत असे आपल्या पत्रव्यवहारांत नमूद केले (१९३६). पौनीची प्राचीनता तेथे आढळणाऱ्या पुरावशेषांव्यतिरिक्त तेथील क्षत्रप रुपिअम्म याचा लेखयुक्त छायास्तंभ आणि वाकाटक राजवंशातील दुसरा प्रवरसेन याच्या ताम्रपटामुळे अधोरेखित झाली. प्राच्यविद्यासंशोधक वा. वि. मिराशी यांनी छायास्तंभ उजेडात आणला (१९५७), तर ज्येष्ठ साहित्यिक-संशोधक वि. भि. कोलते यांनी ताम्रपट प्रकाशित केला (१९६९).

येथील जगन्नाथ टेकाडाच्या भोवती नांगरटीमध्ये एका प्रचंड यक्षप्रतिमेचा अर्धा भाग, मौर्यकालीन अक्षरवटिकांचा उत्कीर्ण लेख असलेली स्तूपाच्या कठड्याची शीर्षशीला इ. प्राचीन बौद्धस्तूपाचे अवशेष अचानकपणे निदर्शनास आले. भारतीय पुरातत्त्व खाते व नागपूर विद्यापीठ यांनी संयुक्तपणे पुरातत्त्वज्ञ जगतपति जोशी व शांताराम भालचंद्र देव यांच्या मार्गदर्शनाखाली येथे उत्खनन केले (१९६९-७०). उत्खननाकरिता जगन्नाथ मंदिर, चांडकापूर (सुलेमान) व हरदोलाला अशा तीन टेकाडांची निवड करण्यात आली. यांतील पहिल्या दोन ठिकाणी शुंग-सातवाहन काळातील हीनयान पंथातील बौद्ध धर्माशी निगडित स्तूपाचे अवशेष प्राप्त झाले. त्यामुळे उत्तर व दक्षिण भारतामधील बौद्ध धर्माचा व त्या अनुषंगाने भारहूत व सांची येथील बौद्ध कलेचा प्रसार पौनी या केंद्रातून होत होता, हे आढळून आले.
जगन्नाथ मंदिर टेकाडाच्या उत्खननात एका प्रचंड स्तूपाचे अवशेष उपलब्ध झाले. या स्तूपाचा व्यास सु. ४१.२ मी. असून त्याचा घुमट विटांत पेटिकापद्धतीने बांधल्याचे आढळले. या स्तूपाभोवती ६ मी. रुंदीच्या फरश्यांनी आच्छादिलेला प्रदक्षिणापथ होता आणि त्याच्याभोवती सांची-भारहूतपद्धतीचा दगडी कठडा किंवा वेदिका होती, तसेच चार दिशांना प्रवेशद्वारे होती, असे आढळले. शिवाय या स्तूपाचा तीन कालखंडांमध्ये विस्तार झाल्याचे आढळून आले. स्तूपाचे अण्ड, हर्मिका व छत्रावली प्रदक्षिणापथाने वेढली होती. दर्शनी भागी एकपाषाणी ध्वजस्तंभ होता. प्रदक्षिणापथाचीही नव्याने रचना करून त्याची रुंदी ३.५० मी. इतकी केलेली आढळली. येथील अष्टकोनी स्तंभांच्या तीन बाजूंवर बौद्धधर्माची प्रतीके (स्तूप, बोधिवृक्ष, चैत्य व भद्रासन), भक्तगण, नाग मुचुलिंदाची कथा व फुलांची नक्षी कोरलेली शिल्पे असून आडव्या सूचीवर प्रदानलेख आहेत. सांची येथील स्तूपापेक्षा या स्तूपाचा परीघ मोठा असून तोरणावर शुंगकालीन शिल्पे कोरलेली आहेत. या स्तूपाचा काळ शुंगशैली, लेख व शिल्पे यांनुसार इ. स. पू. तिसरे शतक ते इ. स. तिसरे शतक असा ठरतो. या स्थानाला तत्कालीन समाजातील सर्व स्तरांतील समुदायाकडून आश्रय लाभला होता, असे वेदिकेवरील प्राकृत भाषेतील ब्राह्मी लिपीत कोरलेल्या अभिलेखांवरून ज्ञात झाले.
पौनी येथे आणखी एका भव्य हीनयानपंथीय बौद्ध धर्माशी निगडित स्तूपाचे अवशेष चांडकापुर टेकाड येथे केलेल्या उत्खननात सापडले (१९६९-७०). या स्तूपसमूहाचे अवशेष जगन्नाथ टेकाडाच्या दक्षिणेस सु. २ किमी. अंतरावर आढळले. या स्तूपाची बांधणी पायरीपद्धतीची असून त्याचा काळ इ. स. चे पहिले – दुसरे शतक असावा. या स्तूपाचा महत्त्वाचा भाग कालौघात नाहीसा झाला आहे. स्तूपाच्या अंतर्भागात अस्थिकलश होता; पण त्यावर अभिलेख आढळला नाही.
पुरातत्त्वज्ञ अमरेंद्र नाथ यांनी भारतीय पुरातत्त्व विभागातर्फे पौनी येथील प्राचीन निवासी वसाहतींचा शोध घेण्यासाठी १९९४ मध्ये उत्खनन केले आणि या उत्खननात आढळलेल्या प्राचीन वसाहतींचा कालानुक्रम पुढीलप्रमाणे ठरविला आहे :
कालखंड १ : मौर्यपूर्व (इ. स. पू. सहावे शतक ते इ. स. पू. चौथे शतक)
कालखंड २ : मौर्य काल (इ. स. पू. चौथे ते इ. स. पू. दुसरे शतक)
कालखंड ३ : शुंग-भद्र (इ. स. पू. दुसरे शतक ते इ. स. पू. पहिले शतक)
कालखंड ४ : क्षत्रप-सातवाहन (इ. स. पू. पहिल्या शतकाचा उत्तरार्ध ते इ. स. दुसरे शतक)
कालखंड ५ : वाकाटक (इ. स. तिसरे शतक ते इ. स. सहावे शतक)
यातील वाकाटक कालखंडात सातवाहन काळातील बांधकामसाहित्याचा पुनर्वापर करून मोठ्या दगडांची बांधलेली तटबंदी व विहिरीचे अवशेष आढळले. अशा प्रकारची तटबंदी बिहार राज्यातील राजगीर येथे सापडली होती, तर दक्षिणेत पौनी येथे ती प्रथमच निदर्शनास आली. प्रस्तुत तटबंदी व अन्य पुराव्यांच्या आधारे पौनी हे वाकाटक काळातील ‘पुरिकाʼनामक नगर असावे, असा तर्क उत्खनकांनी केला आहे. एकूणच प्राचीन काळी पौनी हे विदर्भातील हीनयान पंथाचे मोठे केंद्र होते आणि या केंद्राद्वारे दक्षिणेत बौद्ध धर्म व कला यांचा प्रसार झाला असावा, असे सूचित होते.
संदर्भ :
विदर्भातील वाकाटक कालखंडातील एक महत्त्वपूर्ण ऐतिहासिक स्थळ. हे स्थळ नागपूर जिल्ह्यातील रामटेक तालुक्यात जिल्हा मुख्यालयापासून ४५ किमी. अंतरावर ईशान्येस वसले आहे. या स्थळाची समुद्रसपाटीपासूनची उंची २८५ मी. इतकी आहे. सातपुडा आणि अंबागड पर्वतरांगेच्या दक्षिणेकडे पसरलेल्या कमी उंचीच्या नैसर्गिक टेकाडावर प्राचीन काळातील स्थापत्याचे अवशेष विखुरलेले दिसतात. वा. वि. मिराशी यांच्या मते, या स्थळाच्या उत्तरेस असलेल्या तलावाच्या ‘मणीकालसरʼ या नावावरून या स्थळाला मनसर असे संबोधले जाते. रामटेकच्या लक्ष्मण मंदिरातील यादव राजा रामचंद्रांच्या शिलालेखात या स्थळाचा उल्लेख मणीकालकुंड असा येतो, तर सिंदूरगिरी माहात्म्य आणि महानुभावांच्या स्थान पोथीमध्ये यास अनुक्रमे मणीकाल आणि माणसील असे संबोधले जात होते.

ऐतिहासिक व पुरातत्त्वीय दृष्टिकोनातून मनसर या स्थळाचे सर्वप्रथम सर्वेक्षण टी. वेलस्टेड याने १९२८ मध्ये केले. बंगालच्या रॉयल एशियाटिक सोसायटीमधील १९३३ च्या संशोधन प्रपत्रात मनसर येथील वाकाटककालीन पुरावशेष, स्थापत्य आणि हिंदू व बौद्ध धर्माशी निगडित वास्तू इत्यादीचे वर्णन वेलस्टेडने केले आहे. या स्थळाचे सर्वप्रथम उत्खनन १९८९ मध्ये नागपूर विद्यापीठाच्या प्राचीन भारतीय इतिहास, संस्कृती आणि पुरातत्त्व विभागाने केले. या नंतर १९९४-९५ मध्ये भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षण, उत्खनन शाखा क्र. १, नागपूरतर्फे आणि अलीकडील उत्खनन बोधिसत्व नागार्जुन स्मारक संस्थेच्यावतीने जगत पती जोशी आणि अरुण शर्मा यांच्या संयुक्त निर्देशनाखाली १९९७ पासून नऊ सत्रामध्ये विस्तृत प्रमाणात करण्यात आले.
उत्खननांती मनसर येथे सातवाहन, वाकाटक आणि विष्णूकुंडीन राज्यकर्त्यांनी शासन केल्याचे पुरावे प्राप्त झाले आहेत. मनसर येथे स्थापत्य परंपरेची सुरुवात सातवाहन काळात झाली (इ. स. पू. २०० ते इ. स. २५०) असावी. मनसरच्या टेकाड क्र.१ मधील उत्खननात सर्वांत खालच्या स्तरात राजप्रासादाचे अवशेष मिळाल्याचे उत्खननकर्त्यांचे मत आहे. विटांनी बांधलेल्या या विस्तीर्ण राजप्रासादाचा आकार पूर्व-पश्चिम ५१ मी. तर उत्तर-दक्षिण ४४ मी. इतका होता. प्रासादात राहण्याकरिता अनेक लहान-मोठ्या खोल्या होत्या. राजप्रासादाच्या सुरक्षेकरिता चारही बाजूंनी विटांची संरक्षक भिंत देखील बांधली होती. राजप्रासादाच्या पश्चिमेकडे भव्य मंडप असून याचे आकारमान लांबी २३ मी. आणि रुंदी १९.५० मी. इतके आहे. या विशाल मंडपात विटांनी निर्मित ४२ चौकोनी स्तंभ एकमेकांशेजारी (२.२० मी. अंतरावर) स्थित आहेत. मंडपाच्या सभोवताल विटांच्या भिंतीचे पुरावे उत्खननात मिळाले आहेत. तसेच मनसर येथील हिडिंबा टेकडी (उत्खनन स्थळ क्र.३) परिसरात दोन बौद्ध स्तूपाचे आणि एका चैत्याचे अवशेष प्राप्त झाल्याचे उत्खननकर्त्यांनी नमूद केले आहे. स्थापत्याच्या अवशेषाव्यतिरिक्त सातवाहन राजा गौतमीपुत्र सातकर्णीचे नाण्याचे साचे, लाल चकाकीयुक्त खापरे, काळी चकाकीयुक्त खापरे, रोमन मद्यकुंभ (अम्फोरा), लज्जागौरी आणि कार्तिकेय यांचे शिल्प आणि लोह उपकरणे आदी प्राप्त झाली आहेत.
सातवाहनांच्या अस्तानंतर मनसर येथे विदर्भातील आद्य नरेश वाकाटकांनी प्रत्यक्ष शासन केल्याचे पुरावे मिळाले आहेत (इ.स. २५० ते ५५०). सातवाहन काळातील काही स्थापत्य अवशेषांवर वाकाटक काळात बांधकाम करण्यात आले आणि उर्वरित बांधकामाला भर टाकून समतल करण्यात आले. उत्खननकर्त्यांच्या मते, वाकाटक काळातील राजप्रासादाचे अवशेष हे वाकाटक नृपती प्रवरसेन द्वितीय (इ.स. ४१०–४४०) याच्या काळातील असावे, कारण या राजाने नंदीवर्धन (सध्याचे नगरधन) येथून राजधानी प्रवरपूर येथे स्थलांतर केली होती. उत्खननकर्त्यांनी मनसरची ओळख प्राचीन ‘प्रवरपूरʼ म्हणून केली आहे. वाकाटक काळातील राजप्रासाद तीन मजली असून आकाराने भव्य होता. यामध्ये पश्चिमेकडून पायऱ्याद्वारे प्रवेश करता येत होता. राजप्रासादामध्ये अतिथी कक्ष, सभागृह व त्याला परस्पर जोडलेल्या खोल्या अशी एकूण राजप्रासादाची रचना होती. तसेच प्रासादात लहान-मोठ्या अनेक खोल्या एकमेकांशेजारी बांधलेल्या होत्या. राजप्रासाद आणि त्यामधील कोनाडे व अर्धस्तंभ, चुन्याचा गिलावा आणि चित्रांनी अलंकृत केला होता. राजप्रासादाच्या बाहेर देखील अनेक खोल्यांचे अवशेष आढळले आहेत. इ. स. ४९३ मध्ये नल राजांनी वाकाटक साम्राज्यावर केलेल्या आक्रमणात प्रवरपूर येथील प्रासादाला जाळल्याचे आणि नष्ट केल्याचे पुरावे मिळाल्याचे उत्खननकर्त्यांचे म्हणणे आहे. उत्खननकर्त्यांना याच स्तरात कूर्मचिती, श्येनचिती व त्या संबंधित पुरुषमेध यज्ञाचे अवशेष आढळले आहे. उत्खननात वाकाटक काळातील अनेक मुद्रा आणि मुद्रांके प्राप्त झाली असून त्याद्वारे वाकाटकांच्या इतिहासात मोलाची भर पडली आहे. प्रवरसेन द्वितीयची पेटिका-शीर्षक लिपीत लिहिलेली ‘प्रवरस्यʼ मुद्रांक विशेष महत्त्वपूर्ण असून वाकाटक राजा प्रवरसेन द्वितीयने राजधानी प्रवरपूर येथे स्थलांतरित केल्यानंतर या मुद्रांकाचा वापर केला असावा. वाकाटक काळातील अभ्रकयुक्त लाल रंगाची, लाल चकाकीयुक्त आणि साधी लाल रंगांची खापरे उत्खननात मोठ्या प्रमाणात मिळाली आहेत.
वाकाटकांनंतर मनसरवर विष्णूकुंडीन राज्यकर्त्यांनी काही काळ शासन केल्याचे पुरावे मिळाले आहेत. विष्णूकुंडीन काळातील स्थापत्य अवशेष मनसर येथील वाकाटक काळाच्या अवशेषांवर मिळाले. या काळातील बौद्ध स्तूप आणि विहाराचे अवशेष सर्वांत वरच्या स्तरात प्राप्त झाले आहेत. वाकाटकांच्या भव्य राजप्रासादाचे रूपांतर नंतर बौद्ध स्तूप आणि विहारात झाले असावे. राजप्रासादाच्या खोल्यांचा उपयोग बौद्ध भिक्खुंच्या निवासाकरिता होत होता. विष्णूकुंडीन नरेश महेंद्रवर्मन द्वितीयची तांब्याची नाणी हिडिंबा टेकडी परिसरात मिळाली आहेत. लाल रंगाची खापरे, अभ्रकमिश्रित लाल रंगाची खापरे, काळी चकाकीयुक्त खापरे, दगडी पाटे-वरवंटे, लोह आणि ताम्र उपकरणे इ. मिळाली आहेत.
मनसर येथील उत्खननात वाकाटक काळातील अनेक मंदिराचे अवशेष मिळाले आहेत. येथील मंदिरे प्रामुख्याने शैव पंथीय असून केवळ एक वैष्णव (नरसिंह) मंदिर होते. हिडिंबा टेकडीवरील मंदिराला विद्वानांनी प्रवरसेन द्वितीयच्या ताम्रपत्रात उल्लेखित प्रवरेश्वरदेवकुलस्थान ‘प्रवरेश्वरʼ मंदिर मानले आहे. मनसर येथील नैसर्गिक गुहेत विटांचे बांधकाम करून शिवलिंग प्रस्थापित केले होते, तसेच जाडजूड संरक्षण भिंतीच्या पश्चिम आणि उत्तर-दक्षिणेस लघु आकारांच्या अनेक देवकुलिकात शिवलिंगे मिळाली आहेत. मनसर येथे आणखी एका विटांनी बांधलेल्या ताराकृती आकाराच्या शैव मंदिराच्या जोत्याचे अवशेष प्राप्त झाले आहेत.
मनसर हे वाकाटक काळातील शिल्प परंपरेच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचे आहे. वाकाटकांच्या काळातील अन्य कोणत्याही स्थळापेक्षा जास्त प्रमाणात शिल्पे मनसर येथून प्राप्त झाली आहेत. यात प्रामुख्याने शैव देव-देवता यांची शिल्पे असून गण, यक्ष, किन्नर, प्राणी, साधू आणि स्त्री-पुरुष इत्यादींचे अनेक शिल्पे सुद्धा मिळालेली आहेत. भारताच्या राजधानीच्या ठिकाणी असलेल्या राष्ट्रीय संग्रहालयामधील प्रवेशद्वाराच्या मुख्य कक्षात प्रदर्शित ‘शिव-वामनʼ चे अद्वितीय शिल्प मनसर येथील शिल्प कलेचा परमोच्च बिंदू आहे. मनसर येथील यक्ष, विद्याधर, किन्नर इ. शिल्पांचे अजिंठा येथील चित्रांशी समरूपता दिसून येते, म्हणूनच प्रसिद्ध विद्वान हान्स बाकर यांच्या मते, मनसरची कला आणि अजिंठा येथील चित्रकला यांमध्ये विलक्षण साम्य आहे.
मनसर हे वाकाटक काळातील राजधानीचे ठिकाण म्हणून विशेष महत्त्वाचे असल्याचे उत्खननात प्राप्त झालेल्या विविध पुराव्यांवरून सिद्ध होते. मनसर येथून प्राप्त ताम्रपत्र, शंख लिपीतील लेख, धार्मिक पुरावशेष, सुंदर शिल्पे आणि भव्य स्थापत्यावरून वाकाटक काळातील राजकीय, धार्मिक व सांस्कृतिक परिस्थिती तसेच कला, स्थापत्य आणि धर्म इत्यादींविषयी नवीन माहिती समोर आली; तथापि उत्खननकर्त्यांनी येथील उत्खननाबाबतीत नमूद केलेल्या कालानुक्रमातील आणि काही अवशेषांवरील स्पष्टीकरणासंदर्भात इतर विद्वानांनी प्रश्न उपस्थित केले आहेत.
संदर्भ :
महाराष्ट्रातील एक जिल्ह्याचे ठिकाण आणि प्रसिद्ध पुरातत्त्वीय स्थळ. वत्सगुल्म, वत्स्यगुल्म, वासिम, वंशगुल्म इत्यादी नावांनीही त्याचा उल्लेख आढळतो. महाभारत, वात्स्यायनाचे कामसूत्र, पद्मपुराण, राजशेखरची काव्यमीमांसा, वत्सगुल्ममाहात्म्य इ. प्राचीन ग्रंथांतून तसेच वत्सगुल्म शाखेतील वाकाटक घराण्याच्या कोरीव लेखांतून वत्सगुल्मचा उल्लेख आहे. वत्सऋषींची तपोभूमी म्हणून ते विख्यात आहे. पौराणिक कथेनुसार येथील पद्मतीर्थात वासुकी ऋषीने प्रथम स्नान केले, म्हणून त्यास ‘वासुकी नगरʼ असेही नाव मिळाले. त्या शब्दाचे अपभ्रंश रूप ‘वाशिमʼ हे मुस्लिम राजवटीत रूढ झाले असावे. वाकाटकांच्या काळात वाशिम हे साहित्यिक घडामोडींचे महत्त्वाचे केंद्र होते. प्राकृत भाषेची ‘वच्छोमीʼ (वत्सगुल्मी) ही साहित्यशैली येथेच विकसित व लोकप्रिय झाली. वाकाटक राजवटीनंतर मात्र वत्सगुल्मचे महत्त्व ओसरले.
वाशिमचा प्राचीन इतिहास सुस्पष्ट नाही; तथापि वाकाटक घराण्याच्या एका शाखेची येथे राजधानी होती. या घराण्यातील राजांनी ३३०-५५० पर्यंत सभोवतालच्या भूप्रदेशांवर राज्य केले. नवव्या शतकातील राजशेखर कवीने या शहराला विद्या, कला व संस्कृती यांचे केंद्र म्हटले आहे. येथे काही वर्षे राष्ट्रकूट व नंतर यादव (१२१०-१३१८) घराण्यांची सत्ता होती. मोगल काळात (१५३०-१७५७) ते हैदराबादच्या निजामाच्या अखत्यारित होते. पुढे मराठे, पेशवे आदी सत्तांनी हा भाग ताब्यात ठेवला.
वाकाटक नृपती दुसरा विंध्यशक्ती याचा ताम्रपट १९३९ साली सापडल्यानंतर वाशिम पुन्हा प्रकाशझोतात आले. हा ताम्रपट ‘वत्सगुल्मʼ येथून राजाच्या ३७ व्या राज्यवर्धापनवर्षी देण्यात आला होता. वत्सगुल्म म्हणजेच वाशिम ही सुरुवातीपासून शेवटपर्यंत वाकाटकांच्या पश्चिम शाखेची राजधानी होती. या पार्श्वभूमीवर १९९२-९३ व १९९४-९५ मध्ये महाराष्ट्र शासनाच्या पुरातत्त्व आणि वस्तुसंग्रहालये विभाग, नागपूर यांच्यातर्फे येथे गवेषण, उत्खनन करण्यात आले. हे उत्खनन फुकतपुरा येथील चामुंडेश्वरी मंदिरासमोर सर्वेक्षण क्र. २५६, श्री. इंगळे यांच्या शेतात आणि जैन क्षेत्रपालाचे आधुनिक देऊळ असलेल्या ‘लाला देऊळʼ अशा दोन ठिकाणी करण्यात आले.
श्री. इंगळे यांच्या शेतात केलेल्या उत्खननात १४×१२ मी. मापाचे अंडाकृती बांधकाम सापडले. या बांधकामासाठी भट्टीत भाजलेल्या विटा वापरल्या होत्या. या बांधकामाच्या केंद्रस्थानी विटांनी बांधलेला चौरस असून मध्यभागी एक अष्टकोनी खळगा आहे. हा बहुधा शिवलिंगाच्या शाळुंकेला आधार देण्यासाठी असावा. प्रत्येक कोपऱ्यात तारकाकार साधण्यासाठी इंग्रजी ‘एलʼ आकाराच्या भाजक्या विटांचा वापर केलेला दिसतो. समोर मंडपाचा चौथरा आहे. याशिवाय खापरे, मणी, मातीच्या मूर्ती व इतर वस्तू, लोखंडी वस्तू तसेच वाकाटक व क्षत्रप घराण्यांची नाणी सापडली. याच ठिकाणी शेतात उमा-महेश्वराची व शंखनिधीची प्रतिमा आढळली.
१९९४-९५ मध्ये लाला देऊळ या ठिकाणी उत्खनन करण्यात आले. हे उत्खनन ८०×८० मी.हून थोडे अधिकच मोठे होते. या उत्खननात १ मी. जाडीची प्राकाराची भिंत सापडली. ती सुमारे ७० मी. पूर्वपश्चिम धावत होती. या भिंतीला लागून इतरही काही बांधीव अवशेष सापडले. त्यांपैकी एक बांधकाम अंडाकार असून त्याच्या केंद्रभागातील अष्टकोनी बांधकाम वगळता ते पहिल्या उत्खननात मिळालेल्या बांधकामाशी तंतोतंत मिळतेजुळते होते. या टेकाडाच्या नैऋत्येस एका साध्या तारकाकृती पायावर बेतलेले अंडाकार बांधकाम सापडले. या बांधकामाला देवकोष्ठाची रचना केली होती. तीर्थकुंडाजवळ अष्टकोनी गर्भगृह व आयताकार मुखमंडप होता. इतर अवशेषांमध्ये लघुरूप मृत्तिकास्तंभ महत्त्वाचे आहेत. हे स्तंभ विटांप्रमाणेच भट्टीत भाजलेले आहेत. त्यांचे अजिंठा येथील भित्तिचित्रांत आढळणाऱ्या खांबांशी साधर्म्य आहे. या व्यतिरिक्त तवली, तोटीचे भांडे आणि घडवंचीवरील थाळी या महत्त्वाच्या मृण्मयी वस्तू आहेत. लाल लेपन केलेल्या मृदभांड्यांची पातळ नकली आवृत्ती वाशिम येथे सापडली. तसेच येथे सापडलेल्या नाण्यांचे हमलापुरी येथील नाण्यांशी साम्य आहे.
संदर्भ :
मध्य भारत आणि दख्खनमधील प्रसिद्ध प्राचीन राजवंश. विसाव्या शतकातील सत्तरच्या दशकापर्यंत वाकाटक राजवटीच्या घडामोडींचे अवलोकन गुप्त साम्राज्याच्या परिप्रेक्ष्यातच केले जात असे. विशेषतः या काळातील कला इतिहासाचे गुप्त-वाकाटक अशा संयुक्त शीर्षकाखालीच वर्णन केले गेले. त्यामुळे वाकाटक कालखंडातील कला ही शैलीच्या दृष्टीने स्वतंत्र अशी वैशिष्ट्यपूर्ण कला होती, याची दखल घेतलेली दिसत नाही. परंतु अलीकडे झालेल्या विपुल संशोधनानंतर वाकाटक कालखंडाचे भारतीय कलाइतिहासातील योगदान समोर आले. विशेषत: काही कला प्रकारांमध्ये हा काळ जागतिक कला इतिहासात मानाने गौरविलेला आहे. उदा., अजिंठा. प्रस्तुत नोंदीत शिल्पकला आणि इतर तत्कालीन कलाविशेषांचा विचार केला गेलेला आहे.

इ. स. तिसर्या शतकाच्या मध्यावधीत वाकाटक घराण्याचे स्वतंत्र अस्तित्व मध्य भारत (दक्षिण माळवा) आणि विदर्भात स्थापित झाले. इ. स. पाचव्या शतकाच्या अखेरपर्यंत वाकाटक प्रबळ राजसत्ता म्हणून दख्खन आणि त्या लगतच्या प्रदेशांवर राज्य करीत होते. या घराण्याच्या मुख्यत: नंदिवर्धन (नगरधन, जि. नागपूर) आणि वत्सगुल्म (वाशीम) अशा दोन प्रमुख शाखा होत्या. उपलब्ध पुरातत्त्वीय साधनांच्या आधारे या दोन शाखांचे ऐतिहासिक अस्तित्व दिसते. वाकाटक राजसत्तेचा परमोच्च सत्ताविस्तार हा प्रवरसेन दुसरा या राजाच्या कालखंडात झाल्याचे अभिलेखीय पुराव्यांवरून स्पष्ट होते. उत्तरेकडे विंध्य पर्वतापासून ते दक्षिणेत कुंतल (उत्तर कर्नाटक) देश, तर पूर्वेकडे दक्षिण कोसल (छत्तीसगढ) पासून पश्चिमेकडे कोकणपर्यंत त्यांच्या राज्याचा प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष प्रभाव जाणवतो. हा भौगोलिक विस्तार वाकाटक कालखंडातील कला समजण्यासाठी अत्यंत आवश्यक आहे.
सातवाहन काळात प्रामुख्याने मध्य महाराष्ट्र हा सत्तेच्या केंद्रस्थानी होता. परंतु वाकाटक काळात हे सत्तेचे केंद्र पूर्व विदर्भाकडे स्थलांतरित झाल्याचे दिसते. हा प्रदेश अगदी प्रारंभिक काळापासून विविध प्रकारच्या जनजमातींच्या समुदायांनी व्यापलेला होता. या सामाजिक पार्श्वभूमीचा सुद्धा वाकाटक कलेच्या प्रारंभिक शैलीवर प्रभाव पडला असण्याची शक्यता आहे. वरील संक्षिप्तपणे वर्णन केलेल्या भू-राजकीय परिप्रेक्ष्यातच कलाइतिहास तज्ज्ञांनी वाकाटक कलेची निर्मिती, विस्तार व प्रभावाचा विचार केलेला आहे. वाकाटक कला आणि त्या कलेची वैशिष्ट्ये पुढील प्रश्नांच्या अनुषंगाने समजून घेणे अत्यंत आवश्यक आहे : वाकाटक कलेची पार्श्वभूमी कशी तयार झाली? वाकाटक कलेची मानक वैशिष्ट्ये कोणती? वाकाटक कलेवर समकालीन इतर शैलींचा प्रभाव होता काय? वाकाटक शैलीचा वाकाटकोत्तर कालखंडात प्रभाव कसा आणि कितपत कायम राहिला? या सर्व प्रश्नांचा संक्षिप्त वेध खालीलप्रमाणे घेता येईल.
वाकाटक काळात स्थापत्य कला (लेणी व बांधीव मंदिरे), शिल्पकला, मृण्मयकला, कांस्य शिल्पकला, हस्तिदंत कला आणि चित्रकला इत्यादी कला प्रकार आढळतात. प्रारंभी शिल्पकलेच्या अनुषंगाने वाकाटक कलेचे परिशीलन केले आहे. शिल्पकलेच्या अनुषंगाने वाकाटक कलेचे दोन कालखंड दृग्गोचर होतात. वाकाटक काळातील कलेचा प्रारंभबिंदू म्हणून मांढळ (जि. नागपूर) येथील उत्खननात मिळालेल्या शिल्पांचा विचार करता येईल. या उत्खननात विविध देवदेवतांच्या प्रतिमा मिळाल्या. या प्रतिमा तत्कालीन प्राचीन भारताचा धार्मिक इतिहास आणि दख्खन मधील शिल्पकलेचा संपूर्ण इतिहास समजून घेण्यासाठी महत्त्वाच्या आहेत.

सूक्ष्म अभ्यासांती मांडलेल्या निरीक्षणानुसार असे लक्षात येते की, वाकाटक कलेची वैशिष्ट्ये स्थानिक प्रेरेणेतूनच वृद्धिंगत झालेली असावी. या प्रेरणात्मक भागाची पृष्ठभूमी अमरावती, नागार्जुनकोंडा (आंध्र प्रदेश), वनवासी, कनगनहल्ली (कर्नाटक) आणि तेर (महाराष्ट्र) इ. ठिकाणी उपलब्ध झालेल्या शिल्पांवरून स्पष्ट होते. सुबक ठेंगणा बांधा, विस्तीर्ण खांदे, काहीसी जाड शरीररचना, लंब गोलाकार चेहरा, उठावदार विस्तीर्ण भाल प्रदेश, ओठाचा खालील काहीसा समोर आलेला जाडसरभाग, ठळक रेखीव डोळे, काहीसे पसरट नाक, विविध प्रकारची केशरचना (विशेषत: अगदी प्रारंभिक काळापासून कुरळ्या केसांचा अतिशय कल्पक वापर केशरचना करताना शिल्पकारांनी केलेला दिसतो), जाडेभरडे अधोवस्त्र आणि उत्तरीय, ठळक आणि मोजकेच अलंकार, आयुधे इत्यादी. या शिल्पांच्या आधारावर हे ही लक्षात येते की, तत्कालीन यक्ष प्रतिमांचा या शिल्पकलेवर प्रभाव असावा. त्यासोबतच सातवाहन-ईश्वाकु कालखंडाच्या उत्तर काळात ब्राह्मण आणि बौद्ध धर्मात आमुलाग्र बदल घडून येत होता. या बदलांमुळे विविध प्रतिमांच्या निर्मितीसाठी पोषक प्रेरणात्मक पार्श्वभूमी तयार होत होती. त्याची परमावधी आणि परिणती वाकाटक शिल्पकलेत झालेली आढळते.
मांढळ येथे मिळालेल्या प्रतिमांत अष्टमुख शिव (?), द्वादशमुख शिव (सदाशिव ?), संकर्षण (बलराम), वासुदेव (विष्णू), पार्वती, नैगमेष, देवी (दुर्गा) आणि ब्रह्मा इ. शिल्पांचा समावेश आहे. मध्य भारतात गुप्त साम्राज्याचा विस्तार होत होता. याच काळात (कुषाण/उत्तर कुषाण) सुदूर उत्तरेत मथुरेच्या आसपास आणि त्या लगतच्या प्रदेशात शिल्पकलेच्या संदर्भात आमुलाग्र बदल घडून येत होते. विविध कल्पनांचा वापर या ठिकाणी होत होता. या बरोबरच, याहीपलीकडे गांधार प्रदेशात बौद्ध आणि ब्राह्मण धर्मांच्या प्रतिमा निर्मितीच्या संदर्भात वेगवेगळे प्रयोग होत होते. वरील तीन मुख्य ठिकाणी प्रयोगांशी काही अंशी स्पर्धा करेल अशा कल्पनांचा वापर वाकाटक शिल्पकलेत दिसतो. या प्रयोगांच्या आधारावरच वाकाटक शिल्पकलेची मानके तयार झालेली असावी. या शिल्पकलेचे संपूर्ण सौंदर्यशास्त्र स्थानिक असल्याचे या आधारावर स्पष्ट होते. कारण या शिल्पांशी तुलना करावी अशा प्रकारच्या शिल्पांचा पूर्ण अभाव या काळात दिसतो. या काळात तयार होत असलेल्या प्रतिमानिर्मितीवर प्रारंभिक काळातील वैष्णव आणि शैव धर्मांच्या संकल्पनांचा मोठा प्रभाव असल्याचे अभ्यासकांनी निदर्शनास आणले आहे.

वाकाटक कलेचा दुसरा आणि महत्त्वाचा कालखंड प्रवरसेन दुसरा याच्या काळात सुरू झाल्याचे दिसते. या काळातील शिल्पकलेचे नमुने रामटेक, पवनार, मनसर, भद्रावती, भटाळा, पातुर, हमलापुरी, नगरधन, अजिंठा, घटोत्कच आणि सालबर्डी (मध्य प्रदेश) इत्यादी ठिकाणी पाहायला मिळतात. या बदलांचे प्रतिबिंब त्यांच्या तत्कालीन ताम्रपत्रातील मजकुरावरसुद्धा पडल्याचे दिसते. या काळात वाकाटक शिल्पकला मोठ्या प्रमाणात कलेच्या दृष्टीने परिष्कृत झाल्याचे दिसते. आपल्या स्थानिक कलेचे सत्व न विसरता आवश्यक ते बदल या काळात केले गेले. या बदलावर याच काळात उत्तरेत आणि मध्य भारतात जे शिल्पकलेत बदल घडत होते, त्याचा प्रभाव स्पष्टपणे जाणवतो. विशेषत: शिल्पांची प्रमाणबद्धता, सुबक आणि रेखीव शरीर रचना. उदा., पवनार (जि. वर्धा) येथील गंगेची प्रतिमा, गोलाकार चेहरा, सुंदर रेखीव डोळे, तलम वस्त्राचे अंकन, किंचित वाढलेले परंतु, सुबक अलंकरण उदा. मनसर येथील वामनशिव (?) प्रतिमा इत्यादी. या काळात शिल्पांच्या विषयात सुद्धा वैविध्य आढळते. उदा., पवनार येथे खोदकामात मिळालेल्या रामायण आणि कृष्ण लीलांशी संबंधित शिल्पपट. या शिल्पांमध्ये त्या त्या देवतेच्या प्रकृतीधर्मानुसार त्यांचे दर्शन शिल्पकारांनी घडवल्याचे जाणवते. या काळातील शिल्पांमध्ये एक प्रकारचा राजस भाव प्रदर्शित होतो. त्यासोबतच देवदेवतांच्या शिल्प विषयांचे वैविध्य आणि कल्पकता पुरेपूर जपल्याचे दिसते. उपलब्ध प्रतिमांवरून शैव आणि वैष्णव संप्रदायाचे स्थान या काळात दृढ झाल्याचे स्पष्ट होते.
या काळातील शिल्पकलेच्या परमावधीचे मानबिंदू म्हणून काही शिल्पांचा निश्चितच उल्लेख करता येईल. उदा., रामटेक येथील केवल नृसिंह/रुद्र नृसिंह, मनसर येथील वामन शिव (?) आणि पवनार येथील गंगेची प्रतिमा. ही शिल्पे वाकाटक कलेची स्वयंसिद्ध वैशिष्ट्ये स्पष्ट करण्यास आणि समग्रपणे समजून घेण्यास पुरेशी आहेत. कलाइतिहास तज्ज्ञांनी या शिल्पांची प्रशंसा केलेली आहे. वरील उल्लेखित प्रतिमांत रामटेक येथील केवल नरसिंहाचे शिल्प वाकाटक राजवंशाच्या राजकीय प्रभाव आणि अस्तित्वाचे उत्कृष्ट उदाहरण ठरते.
वाकाटक काळातील शिल्पे ही मुख्यत: अग्निजन्य आणि वालुकाश्म या दोन प्रकारच्या दगडांत शिल्पांकित केली आहेत. माहुरझरी, पवनार, भोकरदन, मनसर, वाशीम आणि नगरधन आदी ठिकाणी उत्खननात उपलब्ध झालेल्या प्रतिमांत लज्जागौरी, नरसिंह, महिषासुरमर्दिनी, विष्णू, गणपती इ. देवतांच्या दगडाच्या प्रतिमा मिळाल्या आहेत. या सर्व प्रतिमा आकाराने जरी लहान असल्या, तरी शिल्पांकनाच्या दृष्टीने तत्कालीन आकाराने भव्य शिल्पांच्या प्रतिकृती वाटतात. या शिल्पांच्या आधारे प्रचलित लोकधर्मासोबतच शैव आणि वैष्णव संप्रदायाचा कसा प्रसार झाला, हे समजावून घेता येते.
अजिंठा येथील शैलगृहांमध्ये असेलेल्या शिल्पांतून बौद्ध धर्माशी संबंधित शिल्पकलेचा वाकाटक काळात कसा विकास झाला, याचे उत्कृष्ट दिग्दर्शन होते. येथील शिल्पकला वाकाटकांच्या वत्सगुल्म शाखेच्या साहाय्याने जरी विकसित झाली असली, तरीही तिचा नंदिवर्धन शाखेशी अन्योन्य संबंध आढळतो. उत्कृष्ट उठावात कोरलेली ही शिल्पे प्रमाणबद्धता, शरीर लय आणि बोलके भाव या वैशिष्ट्यांसाठी ओळखली जातात. अजिंठा येथील शिल्पकलेतून होणारे बुद्धाचे विलोभनीय दर्शन वाकाटक काळातील कलेचा परमोत्कर्ष म्हणून उल्लेख केला जातो. विशेषतः बुद्धाचे महापरिनिर्वाण शिल्प बुद्धाच्या महाकारुणिक अवस्थेचे अप्रतिम भावदर्शन म्हणून भारतीय कला क्षेत्रात उदाहरण दिले जाते. याठिकाणी असलेल्या शिल्पांची प्रमाणबद्धता ही तत्कालीन चित्रकलेशी साधर्म्य आणि संवाद साधणारी आहे, असे कलातज्ज्ञांनी अधोरेखित केले आहे.
या काळात शिल्पकलेची जी वैशिष्ट्ये वृद्धिंगत होत होती, त्या वैशिष्ट्यांचा प्रभाव आणि प्रसार वाकाटकांच्या प्रत्यक्ष अंमलाखाली असलेल्या प्रदेशासोबतच त्यांचे मांडलिक असलेल्या प्रदेशांतील शिल्पकलेवर पडलेले दिसते. उदा., कोकण मौर्य, कदंब, नल, पांडूवंशी, सोमवंशी इ.
वाकाटक सत्तेचा अस्त झाल्यानंतर दख्खनमध्ये वनवासीचे कदंब, बदामीचे चालुक्य, दक्षिण गुजरात, कोकण, माळवा आणि उत्तर महाराष्ट्रात महिष्मतीचे कलचुरी, दक्षिण कोसलमध्ये पांडूवंशी या राजवंशाच्या अखत्यारीत असलेल्या प्रदेशांत जे स्थापत्य आणि शिल्पकला निर्माण होत होती, या सर्वांवर वाकाटक कलेचा मोठा प्रभाव होता. पुढे राष्ट्रकुट काळात वाकाटक कलेच्या पार्श्वभूमीवर दख्खनमधील कलेचा विस्तार आणि प्रसार झाल्याचे दिसते.
वाकाटक काळात मृण्मय कलेचे स्वतंत्र स्थान होते. परंतु सातवाहन काळात मृण्मय कलेचे प्रयोग झाले, तसे वाकाटक काळात आढळत नाहीत. ज्या मोजक्या मृण्मय प्रतिमा पुरातत्त्वीय सर्वेक्षण आणि उत्खननांतून उपलब्ध झाल्या, त्यावरून या काळातील मृण्मय कलेचे आकलन करता येते. हाताने तद्वतच साच्यात तयार केलेल्या मृण्मय प्रतिमा या काळातील मिळतात. प्रतिमांचा विषय आणि त्यांची घडण यांवर तत्कालीन दगडी शिल्पकलेचा प्रभाव दिसतो. उपलब्ध मृण्मय प्रतिमांत विविध प्रकारचे प्राणी, लहान मुलांची खेळणी, अलंकार, शिक्के, शिक्क्यांचे छाप, गृह सजावटीच्या वस्तू, देवदेवतांच्या प्रतिमा मिळालेल्या आहेत. विशेषतः अलीकडेच मनसर, चंदनखेडा आणि नगरधन येथे झालेल्या उत्खननांतून वाकाटककालीन उत्कृष्ट मृण्मय प्रतिमा उपलब्ध झाल्या आहेत. चंदनखेडा (जि. चंद्रपूर) येथील उत्खननात आढळलेली मृण्मय प्रतिमा वैशिष्ट्यपूर्ण आहे. साच्यात तयार केलेली ही मृण्मय प्रतिमा मूळ स्वरूपात गोलाकार असावी. या प्रतिमेत दर्शनी बाजूस हलक्या उठावात स्त्री आणि पुरुष प्रतिमेचे अंकन असून ते गंधर्व युगल असावे. कारण या अंकनात आकाशस्थ विहरण्याचे प्रतिमांकन अतिशय जिवंतपणे केले आहे. या मृण्मय प्रतिमेवर तत्कालीन चित्रकला आणि शिल्पकलेचाही प्रभाव दिसतो.
वाकाटक काळातील कांस्य शिल्पांचे फार मोजकेच पुरावे उपलब्ध आहेत. या उपलब्ध पुराव्यांमध्ये हमलापुरी (जि. नागपूर) येथे खोदकामात मिळालेल्या कांस्य शिल्पांचा उल्लेख करता येईल. या बुद्ध प्रतिमा असून तत्कालीन कांस्य शिल्पात उत्कृष्ट प्रतिमा म्हणून गणल्या जातात. कांस्य धातूच्या ओतीव प्रकाराद्वारे या प्रतिमांची निर्मिती केली आहे. या कांस्य प्रतिमा सारनाथ (उत्तर प्रदेश) आणि नालंदा (बिहार) येथे प्राप्त झालेल्या कांस्य प्रतिमांशी कलात्मक साधर्म्य दर्शवितात.
वाकाटक काळात इतर कलेच्या प्रकारांमध्ये हस्तिदंतावरील कलाकुसरीच्या वस्तू, हाडांवरील कोरीव काम यांचा उल्लेख करता येईल. या वस्तूंचे प्रमाण तुलनेने फारच कमी आहे. उदा., कज्जलशलाका, सारीपाटच्या खेळातील सोंगट्या, केस विंचरण्याचा कंगवा, चाकू इत्यादी. परंतु कलात्मक दृष्ट्या विशेष उल्लेखनीय असे यांमध्ये आढळून येत नाही.
अशा प्रकारे प्रामुख्याने दोन मुख्य कालखंडात वाकाटक कलेचा विचार करता येतो. मांढळ हे प्रारंभिक काळातील, तर नंदिवर्धन (नगरधन), रामटेक, मनसर इ. ठिकाणी वाकाटक कलेच्या द्वितीय कालखंडातील शिल्पे उपलब्ध झाली. या दोन्ही कालखंडांच्या सूक्ष्म अवलोकनातून वाकाटक कलेचा अभिजाततेकडे झालेल्या प्रवासाचा समग्र अभ्यास करता येतो.
संदर्भ :
चित्रसंदर्भ : केवल नृसिंह शिल्प, रामटेक, जि. नागपूर (डॉ. अभिजित दांडेकर यांच्या सौजन्याने).
वाकाटककालीन मंदिर-अवशेषांसाठी प्रसिद्ध असलेले महाराष्ट्रातील एक प्राचीन स्थळ. ते गोंदिया जिल्ह्यात, गोंदिया-बालाघाट मार्गावर गोंदियापासून ६ किमी. अंतरावर आहे. नागरा येथील भैरव टेकाडाचे १९७९ ते १९८२ या कालावधीत सलग तीन वर्षे पुरातत्त्वीय उत्खनन केले गेले. यांतील पहिले उत्खनन सलग दोन वर्षे महाराष्ट्र शासनाच्या पुरातत्त्व व वस्तुसंग्रहालय विभागातर्फे अ. प्र. जामखेडकर यांच्या मार्गदर्शनाखाली झाले, तर तिसऱ्या वर्षी डेक्कन कॉलेज, पुणे यांच्यासोबत संयुक्तपणे शांताराम भालचंद्र देव यांच्या मार्गदर्शनाखाली उत्खनन झाले. या उत्खननांतून वाकाटककालीन मंदिराचे अवशेष उजेडात आले. येथील पुरावशेष १ किमी. त्रिज्येच्या परिसरात विखुरलेले आढळले. त्याचप्रमाणे या टेकाडावर आधुनिक काळात बांधलेले भैरवाचे देऊळ आहे. ही वसाहत तटबंदीयुक्त असल्याचे आढळून आले.
येथील उत्खननात विटांचे बांधकाम असलेल्या वाकाटक काळातील मंदिराचे अवशेष उजेडात आले. हे मंदिर पूर्वाभिमुख असून सुमारे २७ x ४२ मी. आकाराच्या जगती-सदृश (उंच अधिष्ठान) पीठावर उभारलेले आहे. विटांनी बांधलेल्या पायऱ्या पूर्वेकडे असून प्रवेश-सोपानाच्या दोन्ही बाजूंस दोन देवकोष्ठे (कोनाडे) आहेत व ती सर्व बाजूंनी घडीव रचनेने सुशोभित केलेली आढळतात. मंदिराच्या जगतीवरील वेदिबंध उल्लेखनीय आहे. खुरथरावर कुंभथर असून त्यावर घटांतून बाहेर येणाऱ्या पानांची नक्षी आहे. पीठाच्या दोन्ही बाजूंस निर्गम वा प्रवेशाची सोय आहे. सद्यस्थितीत असलेली २.५ मी. उंचीची जगती हे या मंदिराचे खास वैशिष्ट्य आहे. गर्भगृह, अंतराळ व मंडप ५१७ चौमी. क्षेत्रफळ असलेल्या जागेत योजिले होते. गर्भगृह ५ चौमी. क्षेत्रफळ आकाराचे होते व याला भूतप्रणाल (पाणी वाहून नेणारी एक प्रकारची तोटी) आहे. भैरव टेकाडावर सापडलेले शिवलिंग याच मंदिराच्या गर्भगृहातील असावे, असा कयास केला गेला. या शिवलिंगाचा वरील भाग गोलाकार, तर खालील भाग चौरस आहे. एकंदर मंदिराचा आराखडा मध्य प्रदेशातील भूमरा येथील शिवमंदिराशी मिळतजुळता आहे. अ. प्र. जामखेडकरांच्या मते, हे मंदिर इसवी सनाच्या ५ व्या शतकातील असावे.
उत्खननातील इतर उपलब्धींपैकी विटांनी बांधलेल्या पाणी साठविण्याच्या टाकीचा उल्लेख महत्त्वपूर्ण आहे. त्याचप्रमाणे पूजेसाठी वापरल्या जाणाऱ्या पणत्या, दिवे, झाऱ्या यांचे अवशेष व पेटिकाशीर्षक ब्राह्मीलिपीत ‘नारायणो’ असा उल्लेख असलेली स्पटिकमुद्रा सापडली. नागरा येथील पुरावशेषांचा कालखंड इ. स. २५० ते ५५० असा तौलनिक रीत्या निश्चित केला आहे.
संदर्भ :
वाकाटक हे महाराष्ट्रातील एक प्राचीन व प्रसिद्ध राजवंश. या राजवंशाच्या काळातील मंदिरांचे अवशेष मागील काही दशकांपासून विदर्भातील वेगवेगळ्या भागांत उत्खननाद्वारे उजेडात आले आहेत. चंद्रपूर जिल्ह्यातील देवटेक येथे मिळालेल्या शिलालेखामध्ये वाकाटक नृपती पहिला रुद्रसेन याने बांधलेल्या ‘धर्मस्थानाʼबद्दलची माहिती मिळते. ‘धर्मस्थानʼ म्हणजे धार्मिक उपासनेचे स्थळ अथवा मंदिर. वाकाटककालीन मंदिरे विटांची तर आहेतच; परंतु प्रस्तर मंदिरेही आढळतात. विटांनी बांधलेल्या वाकाटककालीन मंदिरांचे अवशेष विदर्भातील मांढळ, मुलचेरा, मनसर, नागरा व वाशिम येथे झालेल्या उत्खननात निदर्शनास आले आहेत. येथील मंदिरांचे अधिष्ठानापर्यंतचे अवशेष उपलब्ध होऊ शकले, मात्र मंदिरांच्या इतर भागांबाबत अंदाज करता आले नाहीत. असे असले तरी तत्कालीन मंदिरस्थापत्याच्या आधारे – उत्तर भारतातील गुप्तकाळातील मंदिरे – या मंदिरांच्या उर्वरित रचनेची कल्पना करता येते. त्याचप्रमाणे ही मंदिरे मंदिरस्थापत्याच्या सुरुवातीच्या टप्प्यातील, प्राथमिक (मांढळ, मुलचेरा) तसेच प्रगत अवस्थेतील (नागरा, मनसर, वाशिम) आहेत.

नागपूर जिल्ह्यातील कुही तालुक्यातील मांढळ येथे १९७५-७७, १९८५ व १९९२ मध्ये करण्यात आलेल्या उत्खननात तीन मंदिरांचे अवशेष प्राप्त झाले. बोंगी हुडकी, भोला हुडकी व वऱ्हाडी तलाव या नावाने ही ठिकाणे ओळखली जातात. येथील पहिली दोन मंदिरे शेजारी, तर तिसरे ५०० मी. अंतरावर आहे. बोंगी हुडकी येथील मंदिररचनेत गर्भगृह व मुखमंडप असलेल्या मध्यम आकाराच्या मंदिराचे अवशेष उपलब्ध झाले. शेजारील भोला हुडकी या ठिकाणी आयताकृती ओटा असून त्याच्या अरुंद बाजू दक्षिणोत्तर आहेत. दक्षिण व उत्तरेकडे ओट्यावर जाण्यासाठी जिने आहेत. या मंदिरापुढे खाली अरुंद होत जाणारे पाच फुटांहून अधिक खोलीचे एक कुंड आहे. मंदिराजवळच पुजाऱ्यांची घरे असावीत. या सर्व वास्तूंभोवती प्राकार होता. प्राकाराच्या आत शैव व वैष्णव मूर्ती भग्नावस्थेत एकाच खड्ड्यात आढळल्या. वऱ्हाडी तलाव येथील मंदिररचनेत गर्भगृह आणि त्यात प्रवेशासाठी पायऱ्या होत्या. सोपानाला ४·४९ मी. लांबीचा कठडा आहे. कठड्याच्या उभ्या बाजूंना नंतरच्या काळात वालुकाश्म घडीव चिरे लावलेले आढळतात. ही चिऱ्यांची भिंत प्रणालकाच्या पातळीपर्यंत आहे. उत्खननादरम्यान प्रतिहारीचे व सिंहाचे शिल्प तसेच गर्भगृहात शिवलिंग सापडले. या मंदिराचा काळ इ. स. चौथे–पाचवे शतक असा ठरतो.
गडचिरोली जिल्ह्यातील मुलचेरा येथे १९८७-८८ आणि १९८८-८९ या काळात झालेल्या उत्खननात दोन मंदिरांचे अवशेष उजेडात आले. गावाच्या सीमेलगत असलेल्या टेकाडातील (विवेकानंदपूर) उत्खननात मंदिराच्या तलविन्यासावरून मुखमंडप व त्याला लागून गर्भगृह अशी रचना दिसून आली. या मंदिराचे पीठ बांधताना पवनी येथील स्तूपामध्ये (जगन्नाथ टेकडी) अंमलात आणलेल्या तंत्राचा प्रभाव असल्याचे दिसून आले. दुसऱ्या मंदिराचे अवशेष विशेष उल्लेखनीय नाहीत.
नागपूर जिल्ह्यातील मनसर (ता. रामटेक) येथे गावापासून पूर्वेला १ किमी. अंतरावर प्राचीन काळातील विटांनी बांधलेली चार मंदिरे हिडिंबा टेकडीच्या उत्खननात उजेडात आली (१९९८–२००८). उत्खनकांच्या मते, यांतील भव्य शिवालय व शिवमंदिर समूह ही दोन मंदिरे ही वाकाटक काळातील होत, तर दुसरी दोन मंदिरे वाकाटकपूर्व काळातील असावीत. या मंदिरांच्या गर्भगृहांचा तलविन्यास तारांकित असून इ. स. दुसऱ्या शतकातील ही सर्वांत प्राचीन मंदिरे होत.
भव्य शिवालय : या मंदिराचे अवशेष हिडिंबा टेकडीच्या माथ्यावर पश्चिमेला निदर्शनास आले. पाषाणाची पायाभरणी केलेल्या या मंदिराच्या वास्तुरचनेचे दोन टप्पे आढळतात. पूर्वाभिमुख असलेल्या या मंदिरास पूर्वेकडे अर्धमंडपास (४·३०×८ मी.) प्रवेशाकरिता पायऱ्या होत्या. अर्धमंडपाच्या पश्चिमेला मंडप (६×५ मी.) व त्यालगत गर्भगृहाचे (५×५ मी.) अवशेष आढळले. हे गर्भगृह फरश्यांनी आच्छादले होते, तर फक्त मंडपाच्या जोत्याचे बांधकाम पाषाणात केले होते. गर्भगृह व मंडपाभोवती २ मी. रुंद प्रदक्षिणापथ होता. मंदिराचा वरचा भाग विटांनी बांधलेला तसेच अलंकारित केलेला असावा, असे अनुमान करण्यात आले. त्याचप्रमाणे वाकाटक काळातील शिल्पपरंपरेतील शिल्पेही उत्खननात सापडली. या मंदिराच्या गर्भगृहातील मूर्ती याच मंदिराच्या नैर्ऋत्य भागातून १९७० साली सापडलेल्या प्रख्यात शिवाची (वामनठेवणीची) असावी. तसेच हे मंदिर वाकाटक नृपती प्रवरसेन (पहिला) याने बांधले असावे, तर प्रवरसेन (दुसरा) याने आपल्या आजोबांच्या (प्रवरसेन पहिला) स्मरणार्थ याचे पुनर्नामांकन केलेले ‘प्रवरेश्वर देवकुलस्थानʼ असावे, असे अनुमान उत्खनकांनी केले आहे.
शिवमंदिर समूह : वाकाटक काळातील दुसरे विटांचे भव्य मंदिर फक्त जोत्याच्या अवशेषरूपाने हिडिंबा टेकडीच्या उत्तर-नैर्ऋत्य-पश्चिम उतारावर आढळले. या मंदिराच्या वास्तुरचनेसंदर्भात दोन टप्पे दिसून आले. टेकडीची नैसर्गिक रचना कायम राखण्याकरिता बांधलेल्या विराट भिंतीच्या साहाय्याने टेकडीच्या माथ्यावर सपाट चौथरा करून त्यावर हे मंदिर उभारले गेले. या मंदिराच्या पहिल्या टप्प्यात मुख्य मंदिराच्या भोवती जोत्यावर लहान लहान २ मी. उंचीची प्रतिमागृहे (shrines) व त्यात देवकोष्ठे (niches) होती. ही अष्टकोनी पन्हाळीसदृश वास्तुरचना असलेली प्रतिमागृहे कौशल्यपूर्ण नियोजनातून तीन स्तरांवर निर्माण केली गेली व तेथे जाण्याकरिता पायऱ्या केल्या गेल्या. या मंदिरसमूहाची प्रतिमागृहे ऊर्ध्वरेषेत संकल्पित केली गेली. ही प्रतिमागृहे कमळाच्या कळीचा आकारात व भौमितिक त्रिकोणांचा कल्पकतेने वापर करून प्रतिमागृहांच्या शिखराचे प्रयोजन केलेले आढळते. उत्तरेकडील काही प्रतिमागृहांतून काही प्रतिमांचे भग्नावशेष मिळाले, तर पश्चिम आणि दक्षिणेकडील सोळा प्रतिमागृहांपैकी सहांमध्ये वैविध्यपूर्ण शिवलिंगे आढळून आली. पुरातत्त्वज्ञ अरविंद जामखेडकर यांच्या मते, वाकाटक काळातील ही मंदिरे पाशुपत संप्रदायाशी निगडित असावीत.
गोंदिया जिल्ह्यातील नागरा येथील भैरव टेकडीवर १९७९-८२ दरम्यान उत्खनन केले गेले. यात भव्य वेदिबंध असलेल्या जगतीमध्ये (२७×४२ मी.) पूर्वाभिमुख मंदिरात पूर्वेकडे पायऱ्यांची रचना केली होती. पीठाचा पश्चिम भाग व्यापणाऱ्या गर्भगृहाच्या (५ चौमी.) आतबाहेर जाणाऱ्या बाह्यरेषेचे काही भाग पीठाच्या थरांवरही दिसून येतात. टेकाडाच्या पृष्ठभागावर आढळलेले शिवलिंग याच मंदिरातील असल्याचे मानले जाते.
येथील मंदिररचनेमध्ये भूतप्रणाल असलेल्या गर्भगृहाव्यतिरिक्त अंतराळ व मंडपाचे अवशेष सापडले. मंडपात जाण्याकरिता पायऱ्या व त्यांच्या दोन्ही बाजूंना छोटेखानी देवळे होती. वैशिष्ट्यपूर्ण जगतीवरील वेदिबंधात खूर थराच्या वर कुंभ थर असून त्याच्यावर साध्या चौरस अर्धस्तांभानी बनलेले देवकोष्ठ आहेत. मध्यप्रदेशातील भूमरा येथील शिवमंदिराशी साधर्म्य असलेले हे मंदिर इ. स. पाचव्या शतकाच्या उत्तरार्धात बांधले असावे.
वाशिम येथे १९९१-९२ आणि १९९४-९५ या काळात झालेल्या उत्खननांत दोन मंदिरांचे अवशेष उजेडात आले. यांतील पहिल्या उत्खननात फुकटपर भागात तारांकित तलविन्यास असलेले मंदिराचे १४×१२ मी. अंडाकृती आकाराचे बांधकाम निदर्शनास आले. इंग्रजीतील ‘एलʼ आकाराच्या विटांचा कौशल्यपूर्ण वापर करून मंदिराच्या पदविन्यासाचा तारांकित आकार प्राप्त केलेला आढळतो. एकूणच वास्तूच्या मधोमध अष्टकोनाकृत चौरस संरचना होती; त्यात शिवलिंग असण्याची शक्यता वर्तविली आहे. तारांकित तलविन्यास प्रकारच्या मंदिरविकासाची प्राथमिक अवस्था हे मंदिर सूचित करते.
वाशिममधील लाल देऊळ भागात झालेल्या उत्खननात (१९९४-९५) मंदिराच्या ७० मी. पूर्व-पश्चिम प्राकारालगत चार वास्तुशेष आढळले. त्यांतील एक अंडाकृती असून त्याचा तलविन्यास तारांकित असला, तरी तो बहुकोनविरहित आहे. येथील मंदिररचनेमध्ये अष्टकोनी गर्भगृह आणि आयताकार मुखमंडपाचे पुरावशेष निदर्शनास आले.
संदर्भ :
विदर्भातील वाकाटक कालखंडातील एक महत्त्वपूर्ण ऐतिहासिक स्थळ. हे स्थळ नागपूर जिल्ह्यातील रामटेक तालुक्यात जिल्हा मुख्यालयापासून ४५ किमी. अंतरावर ईशान्येस वसले आहे. या स्थळाची समुद्रसपाटीपासूनची उंची २८५ मी. इतकी आहे. सातपुडा आणि अंबागड पर्वतरांगेच्या दक्षिणेकडे पसरलेल्या कमी उंचीच्या नैसर्गिक टेकाडावर प्राचीन काळातील स्थापत्याचे अवशेष विखुरलेले दिसतात. वा. वि. मिराशी यांच्या मते, या स्थळाच्या उत्तरेस असलेल्या तलावाच्या ‘मणीकालसरʼ या नावावरून या स्थळाला मनसर असे संबोधले जाते. रामटेकच्या लक्ष्मण मंदिरातील यादव राजा रामचंद्रांच्या शिलालेखात या स्थळाचा उल्लेख मणीकालकुंड असा येतो, तर सिंदूरगिरी माहात्म्य आणि महानुभावांच्या स्थान पोथीमध्ये यास अनुक्रमे मणीकाल आणि माणसील असे संबोधले जात होते.

ऐतिहासिक व पुरातत्त्वीय दृष्टिकोनातून मनसर या स्थळाचे सर्वप्रथम सर्वेक्षण टी. वेलस्टेड याने १९२८ मध्ये केले. बंगालच्या रॉयल एशियाटिक सोसायटीमधील १९३३ च्या संशोधन प्रपत्रात मनसर येथील वाकाटककालीन पुरावशेष, स्थापत्य आणि हिंदू व बौद्ध धर्माशी निगडित वास्तू इत्यादीचे वर्णन वेलस्टेडने केले आहे. या स्थळाचे सर्वप्रथम उत्खनन १९८९ मध्ये नागपूर विद्यापीठाच्या प्राचीन भारतीय इतिहास, संस्कृती आणि पुरातत्त्व विभागाने केले. या नंतर १९९४-९५ मध्ये भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षण, उत्खनन शाखा क्र. १, नागपूरतर्फे आणि अलीकडील उत्खनन बोधिसत्व नागार्जुन स्मारक संस्थेच्यावतीने जगत पती जोशी आणि अरुण शर्मा यांच्या संयुक्त निर्देशनाखाली १९९७ पासून नऊ सत्रामध्ये विस्तृत प्रमाणात करण्यात आले.
उत्खननांती मनसर येथे सातवाहन, वाकाटक आणि विष्णूकुंडीन राज्यकर्त्यांनी शासन केल्याचे पुरावे प्राप्त झाले आहेत. मनसर येथे स्थापत्य परंपरेची सुरुवात सातवाहन काळात झाली (इ. स. पू. २०० ते इ. स. २५०) असावी. मनसरच्या टेकाड क्र.१ मधील उत्खननात सर्वांत खालच्या स्तरात राजप्रासादाचे अवशेष मिळाल्याचे उत्खननकर्त्यांचे मत आहे. विटांनी बांधलेल्या या विस्तीर्ण राजप्रासादाचा आकार पूर्व-पश्चिम ५१ मी. तर उत्तर-दक्षिण ४४ मी. इतका होता. प्रासादात राहण्याकरिता अनेक लहान-मोठ्या खोल्या होत्या. राजप्रासादाच्या सुरक्षेकरिता चारही बाजूंनी विटांची संरक्षक भिंत देखील बांधली होती. राजप्रासादाच्या पश्चिमेकडे भव्य मंडप असून याचे आकारमान लांबी २३ मी. आणि रुंदी १९.५० मी. इतके आहे. या विशाल मंडपात विटांनी निर्मित ४२ चौकोनी स्तंभ एकमेकांशेजारी (२.२० मी. अंतरावर) स्थित आहेत. मंडपाच्या सभोवताल विटांच्या भिंतीचे पुरावे उत्खननात मिळाले आहेत. तसेच मनसर येथील हिडिंबा टेकडी (उत्खनन स्थळ क्र.३) परिसरात दोन बौद्ध स्तूपाचे आणि एका चैत्याचे अवशेष प्राप्त झाल्याचे उत्खननकर्त्यांनी नमूद केले आहे. स्थापत्याच्या अवशेषाव्यतिरिक्त सातवाहन राजा गौतमीपुत्र सातकर्णीचे नाण्याचे साचे, लाल चकाकीयुक्त खापरे, काळी चकाकीयुक्त खापरे, रोमन मद्यकुंभ (अम्फोरा), लज्जागौरी आणि कार्तिकेय यांचे शिल्प आणि लोह उपकरणे आदी प्राप्त झाली आहेत.
सातवाहनांच्या अस्तानंतर मनसर येथे विदर्भातील आद्य नरेश वाकाटकांनी प्रत्यक्ष शासन केल्याचे पुरावे मिळाले आहेत (इ.स. २५० ते ५५०). सातवाहन काळातील काही स्थापत्य अवशेषांवर वाकाटक काळात बांधकाम करण्यात आले आणि उर्वरित बांधकामाला भर टाकून समतल करण्यात आले. उत्खननकर्त्यांच्या मते, वाकाटक काळातील राजप्रासादाचे अवशेष हे वाकाटक नृपती प्रवरसेन द्वितीय (इ.स. ४१०–४४०) याच्या काळातील असावे, कारण या राजाने नंदीवर्धन (सध्याचे नगरधन) येथून राजधानी प्रवरपूर येथे स्थलांतर केली होती. उत्खननकर्त्यांनी मनसरची ओळख प्राचीन ‘प्रवरपूरʼ म्हणून केली आहे. वाकाटक काळातील राजप्रासाद तीन मजली असून आकाराने भव्य होता. यामध्ये पश्चिमेकडून पायऱ्याद्वारे प्रवेश करता येत होता. राजप्रासादामध्ये अतिथी कक्ष, सभागृह व त्याला परस्पर जोडलेल्या खोल्या अशी एकूण राजप्रासादाची रचना होती. तसेच प्रासादात लहान-मोठ्या अनेक खोल्या एकमेकांशेजारी बांधलेल्या होत्या. राजप्रासाद आणि त्यामधील कोनाडे व अर्धस्तंभ, चुन्याचा गिलावा आणि चित्रांनी अलंकृत केला होता. राजप्रासादाच्या बाहेर देखील अनेक खोल्यांचे अवशेष आढळले आहेत. इ. स. ४९३ मध्ये नल राजांनी वाकाटक साम्राज्यावर केलेल्या आक्रमणात प्रवरपूर येथील प्रासादाला जाळल्याचे आणि नष्ट केल्याचे पुरावे मिळाल्याचे उत्खननकर्त्यांचे म्हणणे आहे. उत्खननकर्त्यांना याच स्तरात कूर्मचिती, श्येनचिती व त्या संबंधित पुरुषमेध यज्ञाचे अवशेष आढळले आहे. उत्खननात वाकाटक काळातील अनेक मुद्रा आणि मुद्रांके प्राप्त झाली असून त्याद्वारे वाकाटकांच्या इतिहासात मोलाची भर पडली आहे. प्रवरसेन द्वितीयची पेटिका-शीर्षक लिपीत लिहिलेली ‘प्रवरस्यʼ मुद्रांक विशेष महत्त्वपूर्ण असून वाकाटक राजा प्रवरसेन द्वितीयने राजधानी प्रवरपूर येथे स्थलांतरित केल्यानंतर या मुद्रांकाचा वापर केला असावा. वाकाटक काळातील अभ्रकयुक्त लाल रंगाची, लाल चकाकीयुक्त आणि साधी लाल रंगांची खापरे उत्खननात मोठ्या प्रमाणात मिळाली आहेत.
वाकाटकांनंतर मनसरवर विष्णूकुंडीन राज्यकर्त्यांनी काही काळ शासन केल्याचे पुरावे मिळाले आहेत. विष्णूकुंडीन काळातील स्थापत्य अवशेष मनसर येथील वाकाटक काळाच्या अवशेषांवर मिळाले. या काळातील बौद्ध स्तूप आणि विहाराचे अवशेष सर्वांत वरच्या स्तरात प्राप्त झाले आहेत. वाकाटकांच्या भव्य राजप्रासादाचे रूपांतर नंतर बौद्ध स्तूप आणि विहारात झाले असावे. राजप्रासादाच्या खोल्यांचा उपयोग बौद्ध भिक्खुंच्या निवासाकरिता होत होता. विष्णूकुंडीन नरेश महेंद्रवर्मन द्वितीयची तांब्याची नाणी हिडिंबा टेकडी परिसरात मिळाली आहेत. लाल रंगाची खापरे, अभ्रकमिश्रित लाल रंगाची खापरे, काळी चकाकीयुक्त खापरे, दगडी पाटे-वरवंटे, लोह आणि ताम्र उपकरणे इ. मिळाली आहेत.
मनसर येथील उत्खननात वाकाटक काळातील अनेक मंदिराचे अवशेष मिळाले आहेत. येथील मंदिरे प्रामुख्याने शैव पंथीय असून केवळ एक वैष्णव (नरसिंह) मंदिर होते. हिडिंबा टेकडीवरील मंदिराला विद्वानांनी प्रवरसेन द्वितीयच्या ताम्रपत्रात उल्लेखित प्रवरेश्वरदेवकुलस्थान ‘प्रवरेश्वरʼ मंदिर मानले आहे. मनसर येथील नैसर्गिक गुहेत विटांचे बांधकाम करून शिवलिंग प्रस्थापित केले होते, तसेच जाडजूड संरक्षण भिंतीच्या पश्चिम आणि उत्तर-दक्षिणेस लघु आकारांच्या अनेक देवकुलिकात शिवलिंगे मिळाली आहेत. मनसर येथे आणखी एका विटांनी बांधलेल्या ताराकृती आकाराच्या शैव मंदिराच्या जोत्याचे अवशेष प्राप्त झाले आहेत.
मनसर हे वाकाटक काळातील शिल्प परंपरेच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचे आहे. वाकाटकांच्या काळातील अन्य कोणत्याही स्थळापेक्षा जास्त प्रमाणात शिल्पे मनसर येथून प्राप्त झाली आहेत. यात प्रामुख्याने शैव देव-देवता यांची शिल्पे असून गण, यक्ष, किन्नर, प्राणी, साधू आणि स्त्री-पुरुष इत्यादींचे अनेक शिल्पे सुद्धा मिळालेली आहेत. भारताच्या राजधानीच्या ठिकाणी असलेल्या राष्ट्रीय संग्रहालयामधील प्रवेशद्वाराच्या मुख्य कक्षात प्रदर्शित ‘शिव-वामनʼ चे अद्वितीय शिल्प मनसर येथील शिल्प कलेचा परमोच्च बिंदू आहे. मनसर येथील यक्ष, विद्याधर, किन्नर इ. शिल्पांचे अजिंठा येथील चित्रांशी समरूपता दिसून येते, म्हणूनच प्रसिद्ध विद्वान हान्स बाकर यांच्या मते, मनसरची कला आणि अजिंठा येथील चित्रकला यांमध्ये विलक्षण साम्य आहे.
मनसर हे वाकाटक काळातील राजधानीचे ठिकाण म्हणून विशेष महत्त्वाचे असल्याचे उत्खननात प्राप्त झालेल्या विविध पुराव्यांवरून सिद्ध होते. मनसर येथून प्राप्त ताम्रपत्र, शंख लिपीतील लेख, धार्मिक पुरावशेष, सुंदर शिल्पे आणि भव्य स्थापत्यावरून वाकाटक काळातील राजकीय, धार्मिक व सांस्कृतिक परिस्थिती तसेच कला, स्थापत्य आणि धर्म इत्यादींविषयी नवीन माहिती समोर आली; तथापि उत्खननकर्त्यांनी येथील उत्खननाबाबतीत नमूद केलेल्या कालानुक्रमातील आणि काही अवशेषांवरील स्पष्टीकरणासंदर्भात इतर विद्वानांनी प्रश्न उपस्थित केले आहेत.
संदर्भ :
महाराष्ट्रातील एक भौगोलिक प्रदेश म्हणजे विदर्भ. भंडारा, गडचिरोली, चंद्रपूर, वर्धा, यवतमाळ, बुलढाणा, अकोला, अमरावती, नागपूर, वाशिम आणि गोंदिया या अकरा जिल्ह्यांचा समावेश विदर्भात होतो. विदर्भातील किल्ल्यांचा इतिहास सातवाहन काळापर्यंत मागे जातो. पवनी आणि आदम या दोन ठिकाणी झालेल्या उत्खननात भुईकोट किल्ल्याच्या बांधणीचे पुरावे मिळालेले आहेत. पुढे मध्ययुगीन कालखंडात म्हणजे इ. स. १२-१३ व्या शतकात राजकीय घडामोडींमुळे विदर्भात मोठ्या प्रमाणावर किल्ले बांधणीला सुरुवात झाली. विदर्भात जवळजवळ असे एकूण ३० किल्ले आहेत. हे किल्ले दोन प्रकारांत बांधण्यात आले आहेत. यांतील काही किल्ले हे उंच टेकडीवर आहेत, ज्याला आपण गिरिदुर्ग म्हणतो तर काही किल्ले हे जमिनीवर म्हणजेच भुईकोट प्रकारात बांधलेली आहेत.

मध्ययुगीन व उत्तर मध्ययुगीन काळात विदर्भावर वेगवेगळ्या राजवंशांनी आपल्या सत्ता स्थापन केल्या व किल्ले बांधले. अंदाजे १२-१३ व्या शतकात पूर्व विदर्भावर माना जातीच्या नागवंशीय राजांनी सत्ता स्थापन केली. त्यांनी विदर्भात वैरागड, गडबोली, राजोली, माणीकगड, सुरजागड इत्यादी ठिकाणी किल्ल्यांची बांधणी केली. किल्ल्यांच्या स्थापत्य कलेतून त्यांच्या बांधणीचा कालखंड निदर्शनास येतो. या किल्ल्यांच्या प्रवेशद्वारावर नागांचे शिल्पांकन कोरलेले आहेत. त्यामुळे हे किल्ले नागवंशी राजांनी बांधले असावेत, असा समज आहे. माणीकगड हा गिरिदुर्ग प्रकारात मोडतो. हा किल्ला आकाराने मोठा असून त्याची तटबंदी ही फार लांबवर पसरलेली आहे. किल्ल्यातील स्तंभ, कमानी, मेहरपी अगदी सुबक अशा कलाकुसरीने बनविलेल्या आहेत. वैरागड, सुरजागड, इत्यादी किल्यांची केवळ तटबंदी शिल्लक असलेली आढळून येते.
गोंड राजवटीचा उदय इ. स. १३ व्या शतकाच्या मध्यार्धात पूर्व विदर्भात झाला व त्यांनी या प्रदेशावर आपली सत्ता स्थापन केली. वैरागड, माणीकगड व सुरजागड हे किल्ले गोंडानी आपल्या ताब्यात घेऊन त्याचे नुतनीकरण केल्याचे उल्लेख आहेत. गोंड राजांनी या भागावर जवळजवळ ४०० वर्षे राज्य केले. त्यामुळे त्यांनी बांधलेले किल्ले या भागात जास्त प्रमाणात आढळतात. बल्लारशहा, चंद्रपूर आणि नागपूर ही शहरे त्यांची राजधानीची ठिकाणे होती. बल्लारशहा हा किल्ला वर्धा नदीच्या उत्तर तीरावर स्थित आहे. हा किल्ला चंद्रपूर येथील किल्ल्याच्या तुलनेत आकाराने लहान असून किल्ल्याची तटबंदी व बुरुजे मजबूत स्थितीत आहेत. आतील भागांत काही बांधकामे निदर्शनास येतात, परंतु ती मोठ्या प्रमाणात पडझड झालेली आहेत. चंद्रपूर हा किल्ला आकाराने मोठा असून या किल्ल्यात मोठ्या प्रमाणात आधुनिक वसाहत निर्माण झाली आहे. किल्ल्याची तटबंदी व बुरुज काही भागांत सुस्थितीत आहेत.
गोंड राजांनी बांधलेल्या किल्ल्यांचे प्रमुख वैशिष्ट्य म्हणजे कोरीव काम असलेले अतिशय सुबक प्रवेशद्वार. प्रवेशद्वारावरील हत्तीवर आरूढ सिंहाचे शिल्पांकन हे गोंड राजवटीचे राजचिन्ह म्हणून ओळखले जाते. नगरधन, देवळापार, देऊळगाव, भद्रावती, रामटेक, नागपूरचा गोंडराजाचा किल्ला, आमनेर किल्ला, महदागड किल्ला, पवनीचा किल्ला, वैरागड किल्ला, माहुरगड, अंबागद, भिवगड, गडबोली किल्ला इत्यादी गोंडकालीन किल्ल्यांचे अवशेष आज विदर्भात पाहायला मिळतात. या किल्ल्यांची आज मोठ्या प्रमाणावर पडझड झालेली असून सध्या केवळ तटबंदी व प्रवेशद्वारे सुस्थितीत आहेत.
१३ व्या शतकात खिलजीच्या आक्रमणानंतर महाराष्ट्रात मुस्लीम राजवटीचा उदय झाला व पश्चिम विदर्भावर त्यांनी आपली सत्ता स्थापन केली. खिलजी, तुघलक आणि बहमनी राजसत्तांनी काही किल्ल्याची बांधणी केली. त्यामध्ये गाविलगड, नरनाळा, बाळापूर इत्यादी किल्ल्याचा समावेश होतो. गाविलगड हा किल्ला गवळी लोकांनी बांधला, अशी अख्यायिका स्थानिक लोकांमध्ये प्रसिद्ध आहे. परंतु या संदर्भात कुठलाही पुरावा उपलब्ध नाही. मुजाहिद वंशाच्या अहमदशहा वली पहिला यांनी गाविलगड किल्ला निर्माण केल्याचा उल्लेख फार्सी इतिहासकार फिरिश्ता करतो.
गाविलगड हा किल्ला उत्तरेतून दख्खनमध्ये येणारा जो मार्ग होता, त्या मार्गावर बांधण्यात आलेला होता. त्यामुळे या किल्ल्याला दख्खनचे प्रवेशद्वार मानले जात असे. उत्तरेतून येणाऱ्या मुस्लीम सरदारांना दख्खनमध्ये प्रवेश करताना काही प्रमाणात संघर्षाला सामोरे जावे लागत असे. हा किल्ला नंतरच्या काळात बहमनी, निजामशाही, इमादशाही यांच्या अधिपत्याखाली होता. शेवटी १८ व्या शतकात भोसल्यांनी हा किल्ला आपल्या ताब्यात घेतल्याची नोंद उपलब्ध आहे. या किल्ल्याच्या तटबंदीत वेगवेगळ्या राजवटीत वाढ झाली व आतील भागांत अनेक बांधकामे केलेली आढळतात. त्यामध्ये प्रामुख्याने मशीद हे उत्तम उदाहरण आहे. याच भागात नरनाळा नावाचा किल्ला आहे. हा किल्ला दहाव्या शतकात गोंडानी बांधला, असे म्हटले जाते. पंधराव्या शतकाच्या पूर्वार्धात अहमदशहा वली याच्या काळात या किल्ल्याचे नुतनीकरण झाल्याची नोंद सापडते. नंतरच्या काळात मोगलांनी हा किल्ला जिंकून घेतला.
नागपूरकर भोसल्यांनी १८ व्या शतकाच्या पूर्वार्धात विदर्भावर आपले वर्चस्व प्रस्थापित करून अनेक किल्ल्यांचे नुतनीकरण केल्याचे उल्लेख सापडतात. त्यामध्ये नगरधन, पवनी, रामटेक, गाविलगड इत्यादी किल्ल्यांचा समावेश होतो. मध्ययुगीन काळात महाराष्ट्रात मुस्लीम राजवटींना सत्ता स्थापन करताना अनेक लढायांना सामोरे जावे लागले. त्यामुळे मुस्लीम व मराठा काळातील किल्ले अतिशय मजबूत, तसेच शत्रूच्या आक्रमणापासून सावध राहण्याकरिता केलेल्या सर्व उपाययोजनांनी युक्त आहेत. पूर्व विदर्भात मोठ्या प्रमाणात भुईकोट प्रकारातील किल्ले निदर्शनास येतात. हा भाग घनदाट जंगलांनी व्यापलेला होता. या भागावर येथील स्थानिक गोंड राजांनी राज्य केले. गोंड राजांनी सुरुवातीपासून वेगवेगळ्या काळात मुस्लीम राजवटीचे मांडलिकत्व पतकरल्यामुळे फार कमी प्रमाणात युद्धाला सामोरे जावे लागत असे.
संदर्भ :
नागपूर जिल्ह्यातील पुरातत्त्वीय स्थळ. हे स्थळ वैनगंगा नदीच्या खोऱ्यात वसले असून वाघोर नदीच्या उजव्या तीरावर आहे. या स्थळाचे क्षेत्रफळ उत्तर-दक्षिण ८०० मी. आणि पूर्व-पश्चिम ५०० मी. इतके आहे. हे पुरास्थळ सभोवताल तटबंदीने वेढलेले असून याची जमिनीपासून सरासरी उंची ८ मी. इतकी आहे. या स्थळाचे उत्खनन भारतीय पुरातत्व सर्वेक्षण, विभागाच्या नागपूर उत्खनन शाखेच्या वतीने सन १९८८ ते १९९२ या पाच सत्रांत अमरेंद्र नाथ यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले. अडम हे विदर्भातील आजपर्यंतचे सर्वांत विस्तृत पुरातात्त्विक उत्खनन आहे.

अडम येथील उत्खननात मध्याश्मयुगापासून ते ऐतिहासिक काळापर्यंतचे प्रमाण प्राप्त झाले असून येथील सांस्कृतिक स्तरक्रमाचे विस्तृत विवरण खालीलप्रमाणे :
कालखंड – १ : मध्याश्मयुग. या कालखंडात दगडाची विविध प्रकारची पाती, वेधण्या, लहान भूमितीय आकाराची (त्रिकोण, समांतर-द्विभुज-चौकोन, चंद्रकोर इ.) सूक्ष्म दगडी हत्यारे प्राप्त झाली आहेत. ही हत्यारे चाल्सिडोनी, अगेट, कार्नेलिअन यांसारख्या उत्तम पोताच्या गारगोटीच्या छिलक्यांपासून बनलेली आहेत. मृद्भांड्याचे कोणतेही पुरावे या कालखंडात प्राप्त झाले नाहीत. वर्तुळाकार झोपडीचे वासे उभे करण्यासाठीच्या पाच खड्ड्यांचे पुरावे मिळाले. उत्खनकांनी मध्याश्मयुगीन कालखंड इ. स. पू. ५००० ते इ. स. पू. २००० इतका निश्चित केला आहे.
कालखंड – २ : विदर्भ ताम्रपाषाण संस्कृती. या स्तरामध्ये आढळलेल्या वैशिष्ट्यपूर्ण मृद्भांड्यांवरून या कालखंडाला ‘विदर्भ ताम्रपाषाण संस्कृतीʼ असे नाव दिलेले आहे. ही मृद्भांडी प्रामुख्याने लाल रंगाची असून यावर विविध रंगाचा लेप दिलेला आढळतो, तसेच खापराच्या बाह्य भागावर पांढऱ्या आणि काळ्या रंगाने चित्रकाम केल्याचे दिसून येते. या सोबतच काळ्या-आणि-तांबड्या रंगाची व काळी लेपयुक्त खापरे देखील मिळाली आहेत. यांमध्ये मडकी, विविध आकाराची वाडगी, थाळ्या, लहान भांडी इ. प्रामुख्याने आढळतात. मध्याश्मयुगीन काळाप्रमाणेच ताम्रपाषाणयुगीन लोकांनी दगडी हत्यारांचा उपयोग केला होता. हे लोक साध्या लाकडी वासे आणि छप्पर असलेल्या कुडाच्या घरात राहात. उत्खननात एका वर्तुळाकाराच्या आकारच्या घराचे आणि मातीने सारवलेल्या जमिनीचे पुरावे मिळाले आहेत. नवाश्युगीन काळातील दोन दगडी कुऱ्हाडी मिळाल्या असून त्या बहुधा धार्मिक प्रयोजनाकरिता वापरण्यात येत असाव्यात. या काळातील पुरावशेषांमध्ये तांब्याच्या बांगड्या, हाडांची अवजारे इ. प्रमुख आहेत. रेडिओ कार्बन कालमापन तिथीनुसार या कालखंडाला इ. स. पू. १७५० ते इ. स. पू. १४२५ इतका ठरविण्यात आले आहे.
कालखंड – ३ : लोहयुग. उत्खननकर्त्यांनी लोहयुगाला दोन टप्प्यांत विभागले आहे. लोहयुगाच्या प्रथम टप्प्यात लोखंडाचा सर्वप्रथम वापर सुरू होऊन लोखंडाची अनेक अवजारे प्राप्त झाली आहेत. या टप्प्यातील खापरे प्रामुख्याने लाल रंगाची असून सोबत काळ्या रंगाची आणि महापाषायुगीन संस्कृतीची काळी-आणि-तांबड्या रंगाची खापरे देखील आहेत. खापरांवरील लाल लेपामध्ये अभ्रकाचा सर्रास वापर लक्षणीय आहे. लाल रंगांच्या भांड्यावर पांढऱ्या किंवा काळ्या रंगाने चित्रे काढलेली खापरे वैशिष्ट्यपूर्ण आहेत. पुरावशेषांमधे तांब्याच्या, शंखाच्या आणि हाडांच्या वस्तू, अर्धमौल्यवान दगडी मणी, मृण्मय मणी, पांढऱ्या रंगात नक्षी केलेले कार्नेलिअनचे मणी इ. प्रमुख आहेत.
लोहयुगाच्या द्वितीय टप्प्यात काळ्या-आणि-तांबड्या रंगाच्या खापरांमध्ये वाढ झालेली दिसली व लाल रंगाच्या खापरांची संख्या कमी झाली होती. सोबतच पांढऱ्या रंगात चित्रे काढलेली खापरे या टप्प्यात मिळाली नाहीत. लाल लेपावर काळ्या रंगाने चित्रकारी केलेली खापरे, लोखंडाची बहुउपयोगी उपकरणे आणि हत्यारे, तांब्याची उपकरणे, अर्धमौल्यवान दगडी मणी, पांढऱ्या रंगात नक्षी केलेले कार्नेलिअनचे मणी, मृण्मय मणी आणि पक्षी शिल्पे, शंखाच्या बांगड्या इ. अवशेष बहुसंख्येने मिळाले आहेत. या कालखंडातील लोकांच्या आयताकृती आणि वर्तुळाकार आकाराच्या घरांचे अवशेष प्राप्त झाले आहे. काही वर्तुळाकार घरांसमोर मोकळी जागा (porch) असल्याचे प्रमाण आढळले आहेत. रेडिओ कार्बन कालमापन तिथीनुसार अडम येथील लोहयुगाचा कालावधी इ. स. पू. १४०० ते इ. स. पू. ७०० इतका निर्धारित केला आहे.
कालखंड – ४ : मौर्य आणि शुंग काळ. या कालखंडात अडमच्या सांस्कृतिक स्तरक्रमात विशेष बदल दृष्टिगोचर होत असून, काही नवीन वस्तू आणि पद्धतीचा प्रथमत: उपयोग दिसून येतो. या कालखंडात घरबांधणीकरिता पहिल्यांदा विटांचा वापर केलेला दिसला. या काळात घरांचा आकार वर्तुळाकार न राहता चौकोनी आणि आयताकृती झाला होता. पाण्याकरिता विटांनी बांधलेल्या विहीरी आणि छतावर कवेलूच्या आच्छादनाचा उपयोग याच काळात सुरू झाला असून, नाण्यांचा पुरावा याच काळापासून मिळतो. या कालखंडात मिळालेली उत्तरेकडील काळी झिलईदार खापरे वैशिष्ट्यपूर्ण असून सोबत काळी-आणि-तांबड्या रंगाची, काळ्या रंगाची खापरे सापडली आहेत. एकंदरीत या कालखंडामध्ये अडम येथील ग्रामीण अर्थव्यवस्थेचे रूपांतर शहरी अर्थव्यवस्थेमध्ये होतांना दिसून येते. या कालखंडाच्या महत्त्वपूर्ण पुरावशेषांमधे आहत नाणी, पाटे-वरवंटे, अर्धमौल्यवान दगडी मणी, पांढऱ्या रंगात नक्षीकाम केलेले कार्नेलिअनचे मणी, पदके, हाडांच्या आणि हस्तिदंताच्या वस्तू, मृण्मय मातृदेवता विशेष आहेत. मडक्यात पुरलेली शवाधाने या कालखंडातील स्तरांत मिळाली आहेत. या कालखंडाला इ. स. पू. ३५० ते इ. स. पू. १०० इतके ठरविण्यात आले आहे.

कालखंड – ५ : भद्र, मित्र, सातवाहन, महाराठी आणि सेनापती. या स्तरात प्राप्त खापरे, मुद्रा-मुद्रांक, पुरावशेष आणि नाण्यांच्या आधारावर हा कालखंड भद्र, मित्र, सातवाहन, महाराठी आणि सेनापती म्हणून निर्धारित केला आहे. या काळातील प्रमुख खापरे ही विविध लेप असलेली लाल रंगाची, काळी-आणि-तांबड्या रंगाची, अभ्रकमिश्रित लाल रंगाची, साध्या लाल रंगाची, राखडी केओलिन आणि रौलेटेड प्रकारची असून यांमध्ये मडकी, थाळ्या, झाकण्या, विविध आकारचे वाडगे, रांजण इ. प्रमुख आहेत. खापरांवर विविध आकारचे त्रिरत्न, स्वस्तिक, पक्षी इ. अंकन मिळाले आहेत. मातीच्या खापरांव्यतिरिक्त दगडी भांडी मर्यादित स्वरूपात मिळाली आहेत. या काळातील लोकांची घरे ही चौकोनी, आयताकृती, वर्तुळाकार आणि लंबवर्तुळाकार आकाराची, विटांनी आणि दगडांनी बांधलेली आहेत. शेल प्रकारचे दगड नजीक उपलब्ध असल्याने या दगडांचा भरपूर उपयोग घरबांधणीकरिता करण्यात आल्याचे दिसून येते. आयताकृती घरामध्ये साधारणतः एका रांगेत दोन, तीन किंवा चार खोल्या असून बाहेरच्या बाजूला व्हरांडा आणि अंगण असे. या कालखंडातील मडक्यात पुरलेली, जमिनीत पुरलेली इ. प्रकारची मानवी शवाधाने आढळली.
अडम उत्खननातील सर्वांत महत्त्वाच्या पुरावशेषांपैकी एक असिकस जनपदस लिहिलेली मातीची मुद्रा याच कालखंडातील आहे. या स्तरातून मोठ्या प्रमाणात चांदीची आहत नाणी, तक्षशिला प्रकारची नाणी, तांब्याची नाणी, पितळ आणि शिसे या धातूची नाणी सापडली असून भद्र, मित्र आणि महाराठी यांची नाणी उत्खनित स्तरांतून मिळाली आहेत. सातवाहन राज्यकर्त्यांच्या नाण्यांव्यतिरिक्त नाण्यांचे साचे, विविध रंगाचे अर्धमौल्यवान दगडी मणी, हस्तिदंताच्या आणि हाडाच्या वस्तू, मृण्मय शिल्पे, मणी, खेळणी, काचेच्या आणि शंखाच्या बांगड्या, विविध धातूंच्या वस्तू आणि अवजारे, दगडी पाटे-वरवंटे इ. मोठ्या प्रमाणावर मिळाली आहेत. उपरोक्त पुरावशेषांच्या आधारावर हा कालखंड इ. स. पू. १५० ते इ. स. २५० इतका निर्धारित करण्यात आला आहे.
अडमच्या तटबंदीच्या उत्खननावरून असे निदर्शनास आले आहे की, तटबंदीची निर्मिती लोहयुगापासून सुरू झाली होती. लोहयुगाच्या प्रथम टप्प्यात तटबंदी आणि खंदकाचे निर्माण करण्यात आले असून लोहयुगाच्या द्वितीय टप्प्यात तटबंदीवर दगडी बाधंकाम केले गेले. मौर्य काळात तटबंदी ४.५० मी. ने उंच करण्यात आली होती. अडमच्या तटबंदीची आजची ६.४० मी. उंची आणि खंदकाची २६.५० मी. रुंदी सातवाहन कालखंडातील आहे. या पुरास्थळा नजीक असलेला स्तूप सातवाहन आणि महाराठी यांच्या काळातील आहे. हा स्तूप माती आणि दगडांत निर्मित असून याचे मेधी, अंड, हर्मिकेचे स्थापत्य अवशेष आणि पोच रस्त्याचे पुरावे उत्खननातून प्राप्त झाले आहेत. दोन टप्प्यांत निर्मित या स्तूपात तांब्याच्या नाणी, अर्धमौल्यवान दगडी मणी, मृण्मय मणी इ. वस्तू मिळाल्या आहेत.
अडमच्या उत्खननाने विदर्भाच्या इतिहासावर मोठा प्रकाश टाकला आहे. विदर्भाच्या आद्य शेतकरी ताम्रपाषाणयुगीन संस्कृतीचे ठळक वैशिष्ट्ये आणि समकालीन ताम्रपाषाणयुगीन संस्कृतीपेक्षा वेगळेपण या उत्खननाने पुढे आणली. उत्खननात प्राप्त लोखंडी उपकरणे, अन्नधान्ये, पाळीव प्राण्यांची आणि घोड्यांची हाडे आणि तटबंदी व खंदक निर्मितीची सुरुवात प्रगत लोहयुगाची सुरुवात दर्शवतात. मौर्य-शुंग काळामध्ये अडम येथे सांस्कृतिक, सामाजिक आणि आर्थिक परिवर्तनाची सुरुवात झाल्याचे दिसून येते. उत्खननात प्रथमच अडम या पुरास्थळाला ऐतिहासिक काळात असिकस जनपदस म्हणून संबोधले जात होते, हे सिद्ध झाले आहे. उत्खननात आतापर्यंत अज्ञात असलेल्या पुष्कळ मुद्रा आणि मुद्राकांच्या प्राप्तीने महाराष्ट्राच्या आणि विदर्भाच्या इतिहासात नवीन भर पडली आहे. या उत्खननात विविध काळाची एकूण ५३७४ नाणी मिळाली आहेत, जी महाराष्ट्राच्या उत्खननात सर्वाधिक आहेत. नाण्यांच्या इतक्या विशाल संख्येवरून ऐतिहासिक काळात अडम या स्थळाची आर्थिक भरभराट लक्षात येते. यामध्ये चांदीची आहत नाणी, असिक जनपद प्रकारची आहत नाणी, महाकोसल प्रकारची आहत नाणी, भद्र, दामभद्रची तांब्याची नाणी, मित्र आणि दत्त यांची नाणी, सातवाहनांची नाणी, चांदीची रोमन नाणी, क्षत्रपांची नाणी, महाराठीची नाणी इ. तत्कालीन इतिहासावर विपुल प्रकाश टाकतात. अडम उत्खननातून प्राप्त दामभद्राच्या मुद्रांकावरील नावेचे अंकन, रोमन नाणी, मृण्मय शिल्पे, रूलेटेड खापरे, उत्तरेकडील काळी झिलईदार खापरे, तक्षशिला प्रकारची नाणी इ. देशांतर्गत आणि विदेशी व्यापाराची साक्ष देत आहेत. उत्खननातून प्राप्त स्तूप आणि त्रिरत्न चिन्हे सातवाहन काळातील रहिवाशांवर बौद्ध धर्माचा प्रभाव सिद्ध करतात. सातवाहन साम्राज्याच्या आणि रोमन व्यापाराच्या अस्तानंतर अडम हे पुरास्थळ ओस पडण्यास सुरुवात झाली.
संदर्भ :
गुजरातमधील अरवली जिल्ह्यातील मेशवो नदीच्या तीरावरील एक प्राचीन स्थळ (यापूर्वी साबरकांठा जिल्ह्यात हा भाग होता). पांढरीच्या या टेकाडाला स्थानिक लोक ‘भोज राजाची पहाडीʼ (भोज-राजा-ना-टिम्बो) म्हणून संबोधत असत. येथे लहान-मोठ्या आकाराच्या टेकड्या असून या टेकड्यांतील विटांचा उपयोग करून स्थानिक रहिवाशांनी हा प्राचीन भाग क्षतिग्रस्त केला होता. या टेकडी परिसराच्या काही अंतरावर विटांची टेकाडे, शिवलिंग आणि विटांचे मंदिर, गणेश प्रतिमा आणि मध्याश्मयुगीन दगडी हत्यारे इ. मिळाली होती. गुजरातमधील प्रसिद्ध शामलाजी मंदिर आणि पुरास्थळ या परिसरापासून २ किमी. अंतरावर आहे. या पुरास्थळाचा शोध प. अ. इनामदार यांनी लावला (१९३६).

हे स्थळ मेशवो नदीवरील श्याम-सरोवर धरणाच्या बुडीत क्षेत्रात येत होते. त्यामुळे बुडण्यापूर्वी या स्थळाचे विस्तृत सर्वेक्षण करण्यात येऊन या परिसरातील प्राचीन मानवी वसाहत आणि पुरावे तपासणे गरजेचे असल्याने येथे बडोदा येथील महाराज सयाजीराव विद्यापीठाच्या प्राचीन भारत आणि पुरातत्त्व विभागातर्फे १९६० ते १९६३ या तीन सत्रांमध्ये उत्खनन करण्यात आले. सदर उत्खननाचे निर्देशन र. न. मेहता आणि स. न. चौधरी यांनी केले. या परिसरात एकूण सहा ठिकाणी उत्खनन करण्यात आले. उत्खननामध्ये मध्याश्मयुगीन दगडी हत्यारे, बौद्ध स्थळे आणि एका मंदिराचे अवशेष प्राप्त झाले.
उत्खननामध्ये सर्वांत खालच्या स्तरात मध्याश्मयुगीन लघु हत्यारे मिळाली. उत्खननात बौद्ध धर्माचे दोन विहार, विशाल शारीरिक महास्तूप, चार उद्देशिक स्तूप, चैत्यगृह, मंदिर आणि संरक्षक भिंतीचे अवशेष मिळाले, जे गुजरातच्या आणि भारताच्या इतिहासाकरिता अत्यंत महत्त्वाचे ठरले आहे.
या उत्खननात एकूण पाच स्तूपांचे पुरावे मिळाले असून चार लहान आकाराचे उद्देशिक स्तूप, तर एक शारीरिक प्रकारचा महास्तूप होता. विशाल महास्तूप विटांनी निर्मित असून बांधकामपूर्व खालची काळी जमीन ठासून भक्कम केली होती. स्तूपाचा सर्वांत खालचा भाग २६ x २६ x ३ मी. इतका विस्तीर्ण असून यावरील पहिला थर २१ x २१ x ३ मी., दुसरा थर १६.४ x १६.४ x १.८ मी. इतका होता. दुसऱ्या थराच्या वर १६.४ मी. व्यास आणि ४ मी. उंचीचा स्तूपाचा अंड स्थिरावला होता. स्तूपाच्या हर्मिका आणि छत्रयष्टीचा भाग पूर्णपणे नष्ट झाला होता. स्तूपाच्या दोन्ही थरांमध्ये सभोवताल अलंकृत कोनाडे असून यामध्ये बुद्ध मूर्ती असाव्यात. स्तूपाच्या खालच्या थरांत ११ कोनाडे, तर वरच्या थरांत १० कोनाड्यांची रचना होती. महास्तूपाच्या आतील उत्खननात तळभागात मधोमध मातीच्या मडक्यात १२ सेमी. आकाराचा स्टिॲटाइट (सोप स्टोन) दगडाचा दंडगोलाकार अस्थिकरंडक (Casket) मिळाला. या अस्थिकरंडकाच्या वर विटांचा थर असून यामध्ये बुद्धांच्या ८ मूर्ती मिळाल्या.

प्रदक्षिणापथाच्या वर विटांच्या ३५व्या थरात मिळालेले अस्थिकरंडक या उत्खननाचा सर्वांत महत्त्वाचा पुरावा आहे. या अस्थिकरंडकामध्ये एक तांब्याचे भांडे, क्षत्रपांची चांदीची नाणी, सोने आणि चांदीचे पत्रे, सोन्याचे लघु पात्र, रेशमी वस्त्र आणि अस्थीअवशेष मिळाले आहेत. या अस्थिकरंडकावर उत्कीर्ण इ. स. चौथ्या शतकातील ब्राह्मी लिपीतील अभिलेखानुसार सदर स्तूप ‘पाशान्तिकपल्लिʼ येथे बांधण्यात आला होता आणि पाशान्तिकपल्लि हे देवनीमोरीचे प्राचीन नाव होते. अभिलेखानुसार बौद्ध भिक्खू अग्निवर्मा आणि सुदर्शन यांनी मिळून या स्तूपाचे निर्माणकार्य संचालित केले होते आणि यामध्ये मिळालेले अस्थीअवशेष ‘दशबलʼ यांचे होते. भगवान बुद्धांचे एक नाव दशबल असल्याने सदर अवशेष बुद्धांचे होते, हे सिद्ध होते. त्यामुळे भारतातील अत्यंत महत्त्वाच्या स्तूपांत याची गणना केली जाते. अभिलेखानुसार कथिका राजवंशाच्या १२७ व्या संवत वर्षात रुद्रसेनाच्या कारकिर्दीत हा स्तूप निर्माण केला होता. स्तूपातील नाणी आणि अभिलेखाच्या आधारावर हा महास्तूप क्षत्रप राजा रुद्रसेन तृतीयच्या काळात संभवत: इ. स. ३०५ ते इ. स. ३७५ या कालखंडातील असावा. काळाच्या ओघात स्तूपाची दुरुस्ती करण्यात आली होती आणि यामध्ये बुद्धांच्या खंडित मूर्ती, खंडित दगडांचे आणि विटांचे तुकडे भरण्यात आले होते. नदीच्या पुरापासून स्तूपाच्या सुरक्षेकरिता एक सुरक्षा भिंत बांधण्यात आली होती.
देवनीमोरीच्या महास्तूपामधील तीन थरांची रचना वैशिष्ट्यपूर्ण असून महास्तूपामधील दोन्ही अस्थिकरंडकांची ठेवण पाकिस्तानातील गझ ढेरी या स्तूपातील अस्थिकरंडकाशी साम्य दर्शवणारी आहे. महास्तूपाच्या उत्खननात बुद्धांच्या २६ मूर्ती प्राप्त झाल्या होत्या आणि या सर्व मूर्ती ध्यानमुद्रेतील आहेत. येथील प्रतिमा या मूर्तिशास्त्राच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण असून बुद्ध शिल्पांच्या केसजटांवर गांधार कलेचा प्रभाव दिसतो, तर शरीराची ठेवण कुषाण काळातील मथुरा कलेशी मिळती-जुळती आहे. उत्खननकर्त्यांच्या मते, देवनीमोरी येथील शिल्पे गांधार आणि मथुरा कलेच्या संयुक्त संगमातून उत्पन्न व एक मिश्र शैलीची असून त्यावर क्षेत्रीय प्रभाव स्पष्ट होतो.
विहार : महास्तूपाच्या दक्षिणेकडे विहार असून याचे प्रवेशद्वार उत्तरेकडून होते. विटांनी निर्मित या चौरस विहाराचे आकारमान ४१ x ३८ मी. इतके होते. विहाराच्या मधोमध मोठे अंगण असून सभोवताल ३० खोल्या आणि व्हरांडे होते. विहाराच्या प्रवेशद्वाराच्या समोर खोली क्र.१६ ही पूजेची जागा असून येथील जमीन अलंकृत विटा आणि दगडाने तयार केली होती. पूजागृह आकाराने सर्वांत मोठे असून याचा आकार साधारणतः ७.५ x ३ मी. इतका होता. विहारातील अन्य खोल्यांचा आकार साधारणतः ३ मी. लांब आणि २.५ मी. रुंद इतका होता. खोल्यात प्रवेश करण्याकरिता मधोमध द्वार असून, आतली जागा विटांनी निर्मित होती. विहाराच्या आत अलंकृत विटांनी निर्मित व्याख्यानपीठ मिळाले असून याचा उपयोग कदाचित उपदेश देण्याकरिता होत असावा. विहारात भिक्खूंना बसण्याकरिता विटांचे ओटे, सांडपाण्याचा निचरा होणेकरिता नाल्या, चुल्ही, कवेलूचे तुकडे, लोखंडी खिळे इ. मिळाले आहेत. विहाराचा बाहेरचा भाग अलंकृत विटांनी बांधला होता. या विहाराचे निर्माणकार्य व विस्तार दोन टप्प्यांत झाल्याचे, तर कमीतकमी दोनदा विहाराची दुरुस्ती झाल्याचे पुरावे प्राप्त झाले. उत्खननामध्ये विष्णू आणि महिषमर्दिनीच्या लघु प्रतिमा मिळाल्या. विहाराचे निर्माण महास्तूपांच्या पूर्वी झाले होते, असे उत्खननातून निदर्शनास येते.
देवनीमोरी येथील विहार क्र.१ आणि महास्तूपांच्या निर्मिती नंतर विहार क्र.२ आणि चार येथे उद्देशिक स्तूपांचे बांधकाम करण्यात आले होते. चौकोनी उद्देशिक स्तूपांचा आकार साधारणतः २ ते ३ मी. असून हे स्तूप एकमेकांशेजारी बांधण्यात आले होते. महास्तूपांच्या दक्षिण-पूर्वेकडे चापाकार आकाराच्या चैत्याच्या केवळ पायाचे पुरावे मिळाले आहेत. चैत्याचा पाया दगडी असून वर विटांचे १२ थर आहेत. स्तूप आणि विहाराच्या शेजारी एक शिव मंदिर होते. या मंदिराच्या विटांचा आकार बौद्ध स्थापत्यामध्ये वापरलेल्या विटांइतकाच असल्याने हे मंदिर समकाळातील असून दोन्ही संप्रदाय देवनीमोरी येथे नांदत होते असे दिसते.
उत्खननात रोमन अंफोरा प्रकारची, चित्रकारी आणि ठप्पा असलेली खापरे आणि लाल चकाकीयुक्त खापरे मिळाली आहेत. ही खापरे इ. स. दुसऱ्या शतकात या परिसरात वापरात असल्याने या स्थळाचे कालक्रम करणे सोपे झाले.
निष्कर्ष : देवनीमोरी येथे सर्वप्रथम विहारांचे निर्माण करण्यात आले होते, तदनंतर स्तूप बांधण्यात आले. देवनीमोरी येथे इ. स.चौथ्या शतकापासून बौद्ध विहारे आणि स्तूप परंपरा विकसित झाली होती. कालानुरूप वेळोवेळी येथील स्थापत्याचा विस्तार आणि दुरुस्ती करण्यात आली होती. महास्तूप आणि विहाराचा भाग विविध चिन्हांकित विटा आणि सुबक दगडांनी अलंकृत केला होता. उत्खननात गुप्त राजवंशांचे कुठलेही प्रमाण न मिळाल्याने सदर भाग क्षत्रप राजवटीत विकसित होऊन महत्त्वाचे धार्मिक स्थळ होते, हे सिद्ध होते. देवनीमोरी आणि शामलाजी येथील उत्खननात क्षत्रप राजवटीतील प्राप्त पुरावशेषांच्या अनुषंगाने हे क्षेत्र पश्चिम भारतामधील एक महत्त्वाचे धार्मिक आणि व्यापारी क्षेत्र म्हणून नावारूपास आले होते, असे प्रमाणित होते. इ. स. सातव्या शतकानंतर देवनीमोरी येथील विहारे ओस पडण्यास सुरुवात झाली होती. सन १९७१-७२ च्या सुमारास सदर क्षेत्र मेशवो नदीवरील श्याम-सरोवर या धरणांत समाविष्ट झाले. सांप्रत महास्तूपांच्या जागेवर एक लोखंडी खांब पाण्यात उभा आहे.
संदर्भ :
तेलंगणा राज्यातील एक प्रसिद्ध पुरातत्त्वीय स्थळ. हे स्थळ सूर्यापेट जिल्ह्यातील नगरम तालुक्यात सूर्यापेटच्या ईशान्येस सुमारे ४० किमी. आणि हैदराबादच्या पूर्वेस सुमारे १२५ किमी. अंतरावर आहे. प्राचीन बौद्ध स्थळाचे अवशेष गावाच्या उत्तरेस सुमारे १.५ किमी. अंतरावर उंच टेकाडावर आहेत. या प्राचीन अवशेषांचे समन्वेषण आणि उत्खनन तत्कालीन हैदराबाद सरकारच्या पुरातत्त्व विभागाचे संचालक ख्वाजा मुहम्मद अहमद यांनी केले (१९४१-४४). या उत्खननात प्रामुख्याने विहारांचे अवशेष प्राप्त झाले असून चौरसाकृती विहारांच्या तीन बाजूस भिक्खुगृहांची योजना दिसून येते. या उत्खननात यक्षाचे शिल्प, वेदिकांचे अवशेष, सातवाहन आणि पश्चिमी क्षत्रप या राजवंशांची नाणी सापडली होती.

इ. स. विसाव्या शतकाच्या पूर्वार्धात केलेल्या उत्खननाचे मर्यादित स्वरूप लक्षात घेता आंध्र प्रदेश शासनाच्या पुरातत्त्व आणि वस्तुसंग्रहालये विभागाने बी. बालसुब्रमन्यम, जे. विजय कुमार, जी. व्ही. रामकृष्ण राव आणि के. एस. बी. केशव यांच्या निदर्शनाखाली इ. स. २००१-२००७ या दरम्यान येथे उत्खनन केले गेले. या उत्खननाचा प्रमुख उद्देश हा प्राचीन बौद्ध स्थळाच्या स्थापत्यिक अवशेषांचे स्वरूप जाणून घेणे हा होता. या उत्खननात टेकाडाच्या दक्षिण भागात भव्य महास्तूपाचे अवशेष सापडले. स्तूपाची बांधणी चक्राकृती स्वरूपाची असून स्तूपाच्या अधिष्ठान, अंड आणि चार आयक जोते (स्तूपाच्या चार दिशेस असणारे स्तंभयुक्त जोते) यांचे अवशेष सुद्धा उत्खननात सापडले. या स्तूपासमोरील भागात एका तोरणद्वाराचे अवशेष मिळाले. मध्य भारतातील काही बौद्ध स्तूपांना उदा., सांची स्तूप क्रमांक १ आणि ३, भारहूत स्तूप यांना तोरणद्वार बसविलेले आढळून येते. ज्याला तोरणद्वार बसविले होते, असा दक्षिण भारतातील हा एकमेव स्तूप आहे. तोरणद्वाराच्या तुळईवर बुद्ध जीवनातील महत्त्वपूर्ण प्रसंग: जन्म, महाभिनिष्क्रमण, मारविजय, धर्मचक्रप्रवर्तन, तपस्सू आणि भल्लीक यांचे दान वगैरेचे अंकन केलेले आहे. टेकाडाच्या उत्तर आणि वायव्य भागात चार अर्धवर्तुळाकृती चैत्यगृहांचे अवशेष प्राप्त झाले आहेत. चैत्यगृहांत स्तूपांचे अवशेष सुद्धा सापडले आहेत.

या उत्खननात उत्तर आणि पूर्वेकडील भागांत सहा विहारांचे अवशेष प्राप्त झाले. या विहारांचा तलविन्यास आयताकृती असून भिक्खुगृहांना सामाईक व्हरांडा आहे. या विहारात प्रवेश करण्यासाठी असलेल्या प्रवेशद्वारात पूर्णघटाचे अलंकरण विटात साचेबद्ध रूपात केलेले आढळून येते. विहारात असलेल्या भिक्खुगृहाच्या प्रवेशद्वारावर चंद्रशिला बसवलेली आहे. या उत्खननात बुद्ध आणि बोधिसत्त्व यांच्या प्रतिमा, जातककथा शिल्पपट्ट, बुद्धपद व पूर्णकुंभ यांचे शिल्पपट्ट, दंपतीशिल्प, गिलावा (stucco) पद्धतीने तयार केलेली मानवी शीर्षे आदी शिल्पावशेष सापडले आहेत. आहत व रोमन नाणी आणि सातवाहन, पश्चिमी क्षत्रप, महातलवार व इक्ष्वाकू या राजवंशाची नाणी सापडली आहेत. ब्राह्मी लिपीतील आणि प्राकृत भाषेतील सातवाहन आणि इक्ष्वाकू कालखंडातील ४२ शिलालेख या उत्खननात सापडले. या शिलालेखांमध्ये इक्ष्वाकू राजा रुद्रपुरुषदत्त याच्या १८व्या राज्यवर्षातील शिलालेख उल्लेखनीय आहे, ज्यामुळे या राजवंशावर नवा प्रकाश पडला आहे.
तेलंगणा शासनाच्या हेरिटेज तेलंगणा विभाग आणि डेक्कन कॉलेज पदव्युत्तर संशोधन संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने २०१८-२०१९ या दरम्यान फणीगिरीचे पुनः उत्खनन केले गेले. प्रस्तुत उत्खननाचा मुख्य उद्देश हा यापूर्वी या पुरातत्त्वीय स्थळावर केल्या गेलेल्या उत्खननात वेगवेगळ्या भागांत खोदकाम झालेले असल्यामुळे या उत्खननात प्राप्त प्राचीन स्थापत्यिक अवशेषांचे असलेला संबंध, त्यांचे या प्राचीन बौद्ध स्थळाच्या जडणघडणीतील आणि विकासातील स्वरूप जाणून घेणे आणि त्यांची कालसंगत मांडणी करण्याच्या दृष्टीने संशोधन करणे होता. हे उत्खनन हेरिटेज तेलंगणा विभागाचे साहाय्यक संचालक पी. नागराजू आणि डेक्कन कॉलेज पदव्युत्तर संशोधन संस्थेचे डॉ. श्रीकांत गणवीर यांच्या संयुक्त निदर्शनाखाली केले गेले. या उत्खननात स्तंभयुक्त मंडप, वर्तुळाकृती चैत्यगृह, विहार, काम्य स्तूप यांचे अवशेष सापडले.
टेकाडाच्या ईशान्य आणि मध्यवर्ती भागात चार विहारांचे अवशेष सापडले. या विहारात विविध आकारांची भिक्खुगृहे असून त्यांच्या आतील भिंतींवर प्लॅस्टरचे अवशेष सुद्धा प्राप्त झाले आहेत. ईशान्य भागात २४ स्तंभयुक्त मंडपाचे अवशेष सापडले. या मंडपात पाषाणी स्तंभ विटांनी बांधलेल्या चौरस किंवा आयताकृती जोत्यात बसविले होते. टेकाडाच्या मध्यवर्ती भागात वर्तुळाकृती चैत्यगृहाचे अवशेष सापडले, ज्यातील स्तूप हा जवळ-जवळ पूर्णतः नष्ट झालेला आढळून आला. पूर्णतः भाजक्या विटांचा वापर केला गेलेला नसल्यामुळे या चैत्यगृहातील स्तूप टिकून राहू शकला नाही. अशा प्रकारच्या वर्तुळाकृती चैत्यगृहाचे अवशेष आंध्र प्रदेशातील शालिहुंडम, थोतलाकोंडा, बावीकोंडा इत्यादी प्राचीन बौद्ध स्थळांवर सापडले आहेत. तांबडी लेपयुक्त मृद्भांडी, तांबडी मृद्भांडी, काळी-आणि-तांबडी मृद्भांडी, काळी लेपयुक्त मृद्भांडी आदींचे अवशेष मिळाले आहेत. सातवाहन, महातलवार व इक्ष्वाकू या राजवंशाची नाणी या उत्खननात सापडली आहेत.
फणीगिरी येथील बौद्ध पुरावशेषांच्या उत्खननातून दक्षिण भारतातील प्रामुख्याने पूर्व दख्खन प्रदेशातील बौद्ध स्थापत्याबाबत महत्त्वपूर्ण माहिती उपलब्ध झाली आहे. इ. स. पहिल्या-दुसर्या शतकापासून ते इ.स. पाचव्या शतकापर्यंत साधारणतः तीनशे-चारशे वर्षे बौद्ध धम्माचे दक्षिण भारतातील महत्त्वपूर्ण केंद्र होते. सातवाहन राजवंशाच्या कारकिर्दीत प्रतिष्ठापित झालेले हे बौद्ध धम्मीय केंद्र इक्ष्वाकू राजवंशाच्या कारकिर्दीत बहरले.
[संकेत-शब्द: फणीगिरी, स्तूप, तोरण द्वार, विहार,मंडप, चैत्यगृह, ईक्ष्वाकू,सातवाहन,महातलवार]संदर्भ :
अजिंठा हे महाराष्ट्रातील प्राचीन लेणी, शैलगृहे व भित्तिचित्रे यांचे एक जगप्रसिद्ध स्थळ. ते औरंगाबाद जिल्ह्यात उत्तरेस सु. १०३ किमी. अंतरावर आहे. येथे एकूण तीस बौद्धधर्मीय लेणी (गुंफा) असून यांपैकी क्र. ९, १०, १९, २६ व २९ ही चैत्यगृहे व बाकीचे पंचवीस विहार आहेत. कालखंडाच्या दृष्टीने या लेण्यांपैकी ९ व १० ही चैत्यगृहे आणि ८, १२, १३ व ३० हे विहार हीनयान पंथाचे असून त्यांचा काल इ. स. पू. २ रे शतक ते इ. स. २ रे शतक असा आहे. बाकीची लेणी महायान पंथाची असून येथील अवशिष्ट शिलालेखांवरून असे दिसून येते की, ती वाकाटक वंशातील शेवटचा ज्ञात सम्राट हरिषेण ह्याच्या कारकिर्दित (सु. ४७५–५००) कोरली गेली असावीत. येथे सातवाहन काळातील लयन स्थापत्याच्या पहिल्या टप्प्यात, सामान्य व्यक्तींनी आपल्या ऐपतीप्रमाणे चैत्य आणि बौद्धविहारांसाठी अनेक घटकांचे दान दिलेले दिसते. दुसऱ्या टप्प्यात, महायान काळात मात्र प्रामुख्याने वाकाटकनृपती यांच्या राजाश्रयातून हे लयन स्थापत्य उभे राहिलेले दिसते. येथील गुंफा क्र. १६, १७ आणि २० येथील शिलालेख हरिषेण याच्या राज्यकालादरम्यानचे आहेत. हे लेख राजा हरिषेण याचे सामंत आणि मंत्री यांचे आहेत.
गुंफा क्र. १६ : (वराहदेवाचा लेख).
या लेखाचा शोध इ. स. १८६२ मध्ये प्राच्यविद्यापंडित भाऊ दाजी लाड यांनी लावला व त्याचे सर्वप्रथम वाचन केले. त्यानंतर स्कॉटिश पुरातत्त्वज्ञ जेम्स बर्जेस आणि भारतविद्याविशारद भगवानलाल इंद्रजी यांनी १८८१ मध्ये, प्राचीन भारतीय लिपींचे जर्मन अभ्यासक योहान गेओर्ख ब्यूलर (Johann Georg Buhler) यांनी १८८३ मध्ये आणि प्राच्यविद्यासंशोधक वा. वि. मिराशी यांनी १९४१ मध्ये या लेखाचे पुनर्वाचन केले.
प्रस्तुत लेख वत्सगुल्म शाखेतील वाकाटक नृपती हरिषेण याचा मंत्री वराहदेव याचा आहे. गुंफेच्या व्हरांड्याच्या एका टोकाला डावीकडील भिंतीवर दक्षिणी पद्धतीच्या पेटिकाशीर्ष ब्राह्मीलिपीत संस्कृत भाषेत हा लेख कोरलेला असून संपूर्ण लेख पद्यात आहे. मात्र यात देवटेक येथील लेखाप्रमाणे डोक्यावरील पेटिका पूर्णपणे खोदल्या आहेत. या लेखाच्या २७ ओळी असून त्यात ३२ पद्ये आहेत. लेख खूपच झिजला आहे. विशेषत: आठव्या ओळीपर्यंतचा मध्यभाग व डाव्या बाजूकडील अक्षरे वाचता येत नाहीत.
या लेखाचे मुख्यत: दोन भाग आहेत. पहिल्या भागात वाकाटक राजा हरिषेण याची त्या वंशाचा मूळ पुरुष राजा विंध्यशक्तीपासूनची वंशावळ दिली आहे. त्याला ‘द्विजʼ (ब्राह्मण) म्हणून गौरविले आहे. देवसेन आणि हरिषेण यांचे मंत्री हस्तिभोज आणि पुत्र वराहदेव यांचे वर्णन केले आहे. हस्तिभोज हा कुशल मंत्री आणि गजदळाचा अधिपती असून देवसेनाने निर्धास्तपणे त्याच्या हाती राज्यकारभाराची धुरा सोपवली होती. हरिषेणाच्या वर्णनादरम्यान कुंतल, अवंती, कलिंग, कोसल, त्रिकुट, लाट आणि आंध्र या प्रांतांची नावे आली आहेत. या ठिकाणी लेख भग्न झाला आहे. बहुधा हरिषेणाने जिंकलेल्या राज्यांची ती यादी असावी.
लेखाच्या दुसऱ्या भागात चैत्यमंदिर, मंडपरत्न, पाण्याची विशाल टाकी आणि नागराजाचे मंदिर (नागेंद्र वेश्मा) इ. बौद्धसंघाला अर्पण केल्याचा उल्लेख आहे. या दानाचे पुण्य आपल्या मातापित्यांना मिळावे, अशी इच्छा त्याने व्यक्त केली आहे.
अजिंठ्यापासून सु, १५ किमी. अंतरावर पश्चिमेस गुळवाडा येथे घटोत्कच गुंफा आहेत. येथे एक अठरा ओळींचा शिलालेख आहे. अक्षरांची धाटणी अजिंठा येथील १६ आणि १७ क्रमांकांच्या लेखांप्रमाणेच आहे. हा विहारदेखील वराहदेवानेच निर्माण केला होता. विशेष म्हणजे या लेखातून आपल्याला त्याच्या कुळाबद्दल सविस्तर माहिती मिळते. वराहदेव हा वाल्लूर येथील ब्राह्मण होता. यज्ञपति हे त्याच्या मूळ पुरुषाचे नाव होते. लेखात उल्लेख केलेले त्याचे सर्व पूर्वज वाकाटक राजांचे मंत्री असल्याचीही नोंद आहे.
वा. वि. मिराशी यांच्या मते, सन १९३६ मध्ये वाशीम ताम्रपट मिळेपर्यंत या वत्सगुल्म शाखेविषयी मुळीच माहिती नव्हती. या शाखेच्या कित्येक नृपतींची नावे अजिंठा येथील सोळा क्रमांकाच्या लेण्यातील लेखात आली आहेत; तथापि तो लेख अत्यंत खराब झाल्यामुळे त्यातील नावे बरोबर वाचता आली नव्हती. वाशीम ताम्रपटांतील माहितीवरून अजिंठा लेखातील खरी राजनामे उपलब्ध झाली आहेत. त्यावरून इंध्याद्री पर्वतराजीच्या दक्षिणेस वाकाटकांची दुसरी शाखा राज्य करीत होती, हे सिद्ध झाले आहे.
गुंफा क्र. १७ : (हरिषेणाच्या मांडलिकाचा लेख).
प्रस्तुत लेख गुंफेच्या व्हरांड्याच्या भिंतीवर कोरला आहे. हा लेख संस्कृत पद्यात असून त्यात २९ वृत्तबद्ध श्लोक आहेत. लिपी दक्षिणी पद्धतीची पेटीकाशीर्ष ब्राह्मी आहे. हा लेख प्रथम १८६३ मध्ये भाऊ दाजी लाड यांनी वाचला. त्यानंतर भगवानलाल इंद्रजी यांनी १८८३ मध्ये त्याचे पुनर्वाचन प्रसिद्ध केले. हा लेख अनेक ठिकाणी खंडित असल्याने त्याच्या अर्थपूर्ण वाचनात अडचणी येतात. ज्या राजाने हा लेख कोरविला होता, त्याचे नाव आता नष्ट झाले आहे. पण तो वाकाटकनृपती हरिषेणाचा मांडलिक असून बहुधा खानदेशावर राज्य करीत असावा, असे वा.वि. मिराशी यांनी प्रतिपादले आहे.
भगवानलाल इंद्रजी यांनी या लेखात अश्मक देशाच्या धृतराष्ट्र, हरिसांब, शौरिसांब, उपेंद्रगुप्त, प्रथम कच, भिक्षुदास, निलदास, द्वितीय कच, कृष्णदास व त्याचे पुत्र (नाव नाहीसे झाले आहे) आणि रविसांब या राजांच्या नावांचे वाचन केले. हे राजे वाकाटकांचे मांडलिक असावेत.
योहान गेओर्ख ब्यूलर यांच्या मते, ‘रविसांबʼ या आपल्या धाकट्या भावाच्या अकाली मृत्युमुळे त्याला ऐहिक जगाची नश्वरता समजली. मिराशी यांच्या मते, हाच राजा हरिषेण याचा मांडलिक असावा. गुंफा क्र. १७ येथील विहार आणि क्र. १९ येथील गंधकुटी निर्माण करणाऱ्या या राजाचे नाव नष्ट झाले आहे. जेतवनातील गौतम बुद्धाच्या निवासस्थानाला ‘गंधकुटीʼ असे म्हणत असत. प्रस्तुत लेखातही वाकाटक राजा हरिषेण याचा उल्लेख आल्याने हा लेख गुंफा क्र. १६ चा समकालीन असावा.
गुंफा क्र. २० : (उपेंद्रगुप्त याचा लेख).
जेम्स बर्जेस यांनी गुंफा क्र. २० येथील व्हरांड्यातील डाव्या भागाला एका अर्धस्तंभावर असलेल्या खंडित लेखात क्रि (खंडित अक्षरे) याचा पुत्र उपेंद्र (खंडित अक्षरे) याने मंडपाचे दान दिल्याची नोंद केली आहे. गुंफा क्र. १७ मधील लेखाच्या आधारे वॉल्टर एम. स्पिंक यांनी यातील पिता कृष्णदास असून त्याच्या मुलाचे नाव उपेंद्रगुप्त असल्याचे अनुमान केले आहे. कचप्रमाणे उपेंद्रउगुप्त हे नावदेखील या घराण्यात पुन्हा आले असण्याची शक्यता त्यांनी वर्तविली आहे. यावरून गुंफा क्र. १७ आणि २० यांचा दानकर्ता उपेंद्रगप्त असावा, असे त्यांचे मत आहे.
आभिरांच्या आक्रमणामुळे वाकाटक राजघराणे अस्तंगत झाले. याचा प्रभाव अजिंठा येथे गुंफा क्र. २६ मधील लेखाच्या दाखल्यावरुन दिसून येतो. या लेखात संस्कृत भाषेतील सत्तावीस श्लोक आहेत. बर्जेस आणि इंद्रजी यांच्या मते, लेखातील ब्राह्मी लिपीची अक्षरवाटिका गुंफा क्र. १७ च्या काळानंतरची आहे. या लेण्याची देणगी मुनी स्थविराचल व भिक्षू बुद्धभद्र यांनी दिली आहे. भिक्षू बुद्धभद्र याने ही गुंफा आपला मित्र भव्विराज या अश्मक राजाच्या मंत्र्याच्या सन्मानार्थ दान दिल्याचा उल्लेख आहे. पाचव्या शतकाच्या अखेरच्या दशकापर्यंत आभिरांनी अजिंठ्याच्या परिसरात आपले वर्चस्व प्रस्थापित केल्याचा हा दाखला आहे.
संदर्भ :
अजिंठा लेणी, भाग १
ऐतिहासिक आणि राजकीय पार्श्वभूमीचे काही पैलू
डॉ. राजेश कुमार सिंग
बी१-२६४, सिद्धार्थ बंगले
साम – सावली रोड, वडोदरा 390022, गुजरात, भारत
ईमेल: rksingh1970@gmail.com , +९१-९४२९९२५०३६
अजिंठा लेणी, भाग १
ऐतिहासिक आणि राजकीय पार्श्वभूमीचे काही पैलू
सामग्री
प्राचीन इमारतींचे अज्ञात प्रमाण. ४
अजिंठा येथील वास्तुशास्त्रीय शब्दकोश.. ६
हरिषेणाच्या अधिपत्याची रूपरेषा यावर चर्चा. १४
हरिषेणानंतर: वेरूळचा सर्वात जुना टप्पा. २३
हरिषेणाच्या काळात: अजिंठा पुनरुज्जीवन.. २४
सारणी: वाकाटक कालगणना - वेगवेगळ्या आवृत्त्या. ३२
प्रसिद्ध जागतिक वारसा - आणि प्राचीन बौद्ध मठ - अजिंठा (अजिंठा) किंवा अजंता (अजंता) यांनी दुसऱ्या किंवा पहिल्या शतकातील जगातील काही सर्वात जुन्या चित्रांचे नमुने जतन केले आहेत. एकोणिसाव्या शतकाच्या सुरुवातीपासून या विषयावर मोठ्या प्रमाणात साहित्य जमा झाले असूनही, स्मारकाची निर्मिती करणाऱ्या अजिंठा मठाची जटिल पार्श्वभूमी आणि काळाबद्दल फारशी स्पष्टता दिसून आलेली नाही. उदाहरणार्थ, प्राचीन काळात अजिंठा मठाचे नाव काय होते हे आपल्याला माहिती आहे का? उत्तर आहे, नाही. अजय मित्र शास्त्री यांनी अजिंठा या प्राचीन नावाचा शोध घेण्याचा प्रयत्न केला (शास्त्री १९९१). त्यांनी योग्यरित्या ओळखले आहे की या जागेचे आधुनिक नाव देखील समस्याप्रधान आहे. सामान्यतः असे मानले जाते - आणि आपल्याला या श्रद्धेवर शंका घेण्याचे कोणतेही कारण नाही - की या जागेचे नाव गुहेच्या जागेपासून सुमारे १४ किमी अंतरावर असलेल्या अजिंठा नावाच्या जवळच्या गावावरून ठेवण्यात आले आहे. तथापि, ते सर्वात जवळचे गाव नाही, कारण सर्वात जवळचे गाव प्रत्यक्षात लेणापुर (लेणापूर म्हणजे गुहांचे गाव) आहे, जे त्या ठिकाणापासून एक किमीपेक्षा कमी अंतरावर आहे. लेणापूर येथे उत्खनन करण्यात आले होते ज्यामध्ये सातवाहन मातीची भांडी सापडली (घोष १९६७, १४). निःसंशयपणे, लेणापूर हे मठाशी ( संघारामा ) काही प्रकारे जोडलेले होते; कदाचित काही कामगार, किंवा पर्यवेक्षक किंवा देखरेख करणारे भिक्षू तिथे राहत असतील. तथापि, प्राचीन मठाला नाव देण्याच्या प्रयत्नात लेणापूर कसे अयशस्वी झाले हे एक गूढ आहे. कोणत्याही परिस्थितीत, अजंता ही अजिंठा नाही, किमान ध्वन्यात्मकदृष्ट्या नाही. सुरुवातीच्या अहवालांमध्ये, सरकारी फायलींमध्ये आणि पुरातत्व अभ्यासांमध्ये - अजिंठा ही शब्दलेखन पूर्णपणे ध्वन्यात्मकतेवर अवलंबून होती हे अनुमान काढण्यासाठी आपल्याला कल्पनाशक्तीची आवश्यकता नाही, कारण ब्रिटिश अधिकारी आणि युरोपियन विद्वानांनी अजिंठाला अजंठा असे उच्चारले होते. परिणामी, प्रचलित स्पेलिंग आणि उच्चार कायम राहिले आणि सुस्थापित झाले. तरीही, एक मुद्दा लक्षात घेता येईल की स्थानिक, अ-अंग्रेजीकृत महाराष्ट्रीयन आणि मराठी माध्यमे आणि साहित्य बहुतेकदा अजिंठा या शब्दाला अजिंठा असे म्हणतात. सध्याचा लेखक स्वतःला जागतिकपेक्षा स्थानिकांशी अधिक ओळखतो. म्हणूनच, एक प्रतीकात्मक संकेत म्हणून सध्याचा लेखक वाचकांच्या काही दुर्दैवी गैरसोयीच्या जोखमीसह लेखांच्या मालिकेत अजिंठा वापरणे पसंत करतो.
आपल्याला माहिती आहे का की अजिंठा कुठे स्थित होता, म्हणजे कोणत्या प्राचीन प्रांतात किंवा देशात? याचे उत्तर नकारार्थीच द्यावे लागेल. अजिंठा आज भारतातील महाराष्ट्र राज्यातील औरंगाबाद जिल्ह्यात स्थित आहे. त्याचे कडेकोटाच्या मध्यभागी अक्षांश २०°३३'९.६२"उत्तर, रेखांश ७५°४२'०.६८"पूर्व (गुगल इंक. २०१३) आहे. [१] वॉल्टर एम. स्पिंक यांच्या मते, प्राचीन काळात अजिंठा ऋषिक नावाच्या प्रांतात स्थित होते [२] (आकृती १).
आकृती १: 'वाकाटक स्थळांचा नकाशा' स्पिंक आणि यागुची (२०१४:xv) आणि वेनर (१९७७:११)
व्ही.व्ही. मिराशी यांनी ऋषिक देशाची खांडेशशी केलेली ओळख पटवण्यावर हा विश्वास आधारित आहे (मिराशी १९६३, १२३; प्लेट प). तथापि, त्या ओळखीमध्ये, मिराशींनी असे सुचवलेले नाही की अजिंठा ऋषिक देशाच्या सीमेत स्थित होता. प्रत्यक्षात, त्याबद्दल निर्णायकपणे बोलणे कठीण आहे, कारण लेण्या सहयाद्री पर्वतरांगांच्या घाटांवर (उतारांवर) आहेत ज्याच्या वर मूलक [३] किंवा अश्मक [४] देश होता आणि खाली तथाकथित ऋषिक देश होता. अजिंठा दोन्ही देशांच्या/प्रांतांच्या सीमेवर होता. सीमावर्ती घाटांचा ऋषिक किंवा मूलक किंवा अश्मक देशात समावेश होता की नाही हे निश्चित करण्यासाठी कोणताही निर्विवाद रेकॉर्ड नाही.
दगडात कोरलेल्या एकूण इमारतींची गणना निर्मात्यांनी किती केली होती हे आपल्याला माहिती आहे का? उत्तर पुन्हा नकारार्थीच द्यावे लागेल. येथे विशिष्ट प्रश्न उपस्थित केला जातो, कारण इंग्रजी शब्द गुहा कधीकधी समस्याप्रधान असू शकतो. उदाहरणार्थ, मूलभूत गोष्टींचा विचार करा (तपशीलात न जाता). [5] भारतीय पुरातत्व सर्वेक्षण ३० गुहांची गणना करते, [6] आणि समान परिमाण आणि क्रमांकन नैसर्गिकरित्या या विषयावरील साहित्यात कायम आहे. तथापि, परिमाण आणि क्रमांकन प्रणाली विसंगतींपासून मुक्त नाही. चला त्यापैकी काही लक्षात घेऊया.
आकृती २: अजिंठा: गुहा २६-संकुल
आकृती ३: गुहा २६-संकुल (सममितीय योजना): स्पिंक आणि अजित राव यांचे काल्पनिक पुनर्बांधणी (अजित राव आणि नितीन वेतुरकर यांचे कलाकृती; वॉल्टर एम. स्पिंक आणि संस्कार यांच्या सौजन्याने)
भिक्षू बुद्धभद्र यांनी बांधलेल्या इमारतीचे उदाहरण घ्या (आकृती ७). जरी बुद्धभद्र हे गुहा २६ [७] चे सुप्रसिद्ध संरक्षक असले तरी, आज सामान्यतः अशी धारणा स्थापित केली जाते की भिक्षूने गुहा २६ फक्त निर्माण केली. शिलालेखात ' सुगतालय ' (सुगताचे म्हणजेच बुद्धाचे निवासस्थान) नावाच्या इमारतीत एक स्तूप मंदिर आणि अंगणासमोरील दोन खालच्या बाजू आहेत असे गृहीत धरले जाते. अलिकडच्या दशकात, स्पिंकच्या संशोधनातून, ज्यानंतर सध्याचे लेखक आहेत, असे दिसून येते की मंदिरात प्रत्यक्षात दोन्ही बाजूंना चार बाजू आहेत [8] (आकृती ११). जोड्यांमध्ये गुहा २५, २७ आणि खालच्या पंखांची जोडी आहे (आकृती ९). पूर्वी, गुहा २५ आणि २७ ला जोड्य म्हणून ओळखले जात नव्हते; त्यांना स्वतंत्र इमारती, स्वतंत्र गुहा म्हणून ओळखले जात असे . तथापि, संरक्षक बुद्धभद्र आणि इतर भिक्षूंसाठी, चार जोड्यांसह मंदिर (गुहा २६) हे स्पष्टपणे एक शैलग्रीह म्हणून ओळखले गेले असते , तर आपण त्यांना तीन म्हणून मोजतो: गुहा २५, २६ आणि २७. समस्या केवळ क्रमांकनाची नाही. ती संरक्षकाच्या 'कीर्ति' [9] ( कीर्ति ) ची मूळ स्थापत्य रचना समजून घेण्याबद्दल आहे; मंदिर आणि स्मारकासाठी हा शब्द वापरला गेला होता - बुद्धभद्रच्या दान शिलालेखात, जो त्याच मंदिराच्या ओसरीत आहे.
आकृती ६: अजिंठा: गुहा २६-कॉम्प्लेक्स, सुमारे ४८० इ.स., काल्पनिक त्रिमितीय मॉडेल, तपशील वगळून, (सिंग २०१२अ:६१) वरून.
आणखी एक उदाहरण घेऊया. एक धारणा प्रसिद्ध आहे की दुमजली गुहा ६ ही एकच इमारत आहे [10] (आकृती 7). दोन मजल्यांना फक्त एकच क्रमांक देण्यात आला आहे यावरून हे देखील स्पष्ट होते. तथापि, नवीनतम संशोधनात, दोन्ही मजले दोन वेगळ्या इमारती म्हणून ओळखले जातात. त्यांच्यासाठी नवीन नावे जुळवून घ्यावी लागली, म्हणजे गुहा वरची 6 आणि गुहा खालची 6. दोन्ही मजल्यांच्या मजल्यांच्या योजना खूप वेगळ्या आहेत (आकृती 10), आयकॉनोग्राफिक योजना आणि डिझाइन. त्यांच्यात फारसे साम्य नाही. खालच्या मजल्याचे काम सुरू असताना वरचा मजला नियोजित नव्हता हे स्पष्टपणे दिसून येते. [11]
आकृती ७: वरच्या ६ ( वर ) आणि खालच्या ६ ( खाली ) गुहा, (बर्गेस १८८०, प्लेट XXXII) पासून
तिसरे उदाहरण सांगायचे झाले तर, गुहा १८ (आकृती ४) नावाच्या दगडात कोरलेल्या टाक्याला एक संख्या दिली आहे, तर वस्तुस्थिती अशी आहे की त्या ठिकाणी इतर अनेक टाक्या आहेत ज्या अनामिक आहेत; त्यांना अजिबात संख्या नाही; त्यांना लेणी म्हणून ओळखले आणि मोजले गेले नाही . तिथेच समस्या आहे. समस्या गुहा या इंग्रजी शब्दाची आहे . ती मूळ रचनेला मागे टाकते. फक्त एका अखंड संदर्भात खोदलेल्या कोणत्याही गोष्टीला गुहा म्हणून मानले जाते . हा शब्द टाकी, कोठडी, हॉल, मंदिर, मंदिर किंवा अनेक संलग्न युनिट्स असलेल्या विस्तीर्ण संकुलात फरक करत नाही. जर आधुनिक विद्यार्थ्यांनी अजिंठा बनवणाऱ्यांनी वापरलेले शब्दकोश स्वीकारले तर अशा कोणत्याही समस्या उद्भवणार नाहीत. अजिंठा शिलालेखांमध्ये अनेक वास्तुशास्त्रीय शब्दकोश आढळतात. सामान्य ते विशिष्ट संज्ञांपर्यंत त्यांची विविधता आहे.
खालील अजिंठा शिलालेखांमध्ये दिसणाऱ्या काही वास्तुशास्त्रीय संज्ञांचा अपूर्ण शब्दकोष आहे [१२] : शैलगृहम् [१३] शैलगृहम् = रॉक-कट आर्किटेक्चर; कन्दरा कंदारा [१४] = नैसर्गिक किंवा खडक कापलेली गुहा; लयन [१५] लयन / एकाश्मकम् [१६] ekāśmakam = monolithic architecture; उपासय उपासय [१७] (प्राकृत) = उपाश्रय उपाश्रय (Snk.) = a monastic dwelling made of any material; वेश्म [18] veśma = dwelling; नागेन्द्रवेश्म [१९] नागेंद्रवेश्म = नागेंद्र मंदिर; उवरक [२०] उवरक (प्राकृत) = अपवरक ( Snk.) = a monk's cell; मंडप [२१] maṅḍapa = शब्दशः, एक मंडप, परंतु दिलेल्या संदर्भांमध्ये ते बुद्ध मंदिराला सूचित करते; पसादा [२२] पसादा (प्राकृत) = प्रासाद प्रासाद (Snk.) = राजवाडा, मोठे मंदिर; विहार [२३] विहार = एक मठ, पण मठांच्या निवासस्थानाशिवाय किंवा त्याशिवाय मंदिर; मुनिराजचैत्यम् [२४] मुनिराजचैत्यम् / सुगतालयम् [२५] सुगतालयम् / चैत्यमन्दिरम् [२६] चैत्यमंदिरम् / स्तूपविहार [२७] स्तुपविहार / गन्धकुटी [२८] गंधकुटी = बुद्ध मंदिर किंवा बुद्ध मंदिर किंवा दोन्ही प्रतिमा, स्तुप किंवा मंदिर; कीर्ति [२९] कीर्ति = शाब्दिक, कीर्ती, पण प्रसिद्ध स्मारक किंवा प्रसिद्धीचे स्मारक, धार्मिक संदर्भात ते मंदिराला सूचित करते; गवाक्ष [३०] गवाक्ष = पिपळाच्या पानाच्या आकाराची खिडकी (फिकस रिलिजिओसा); निर्य्यूह [३१] निर्य्यूह = गेटवे, प्रवेशद्वार, दरवाजा किंवा गावक्ष यांचे शिखर किंवा शिखर ; सुवीथी [३२] सुविथी = चित्र गॅलरी [३३] ; वेदिका [३४] वेदिका = मंडप, सभामंडप, फेरफार किंवा देवस्थान [३५] ; स्तम्भ [३६] स्तंभ = स्तंभ; विभंग [३७] vibhaṅga = सामान्यतः एक जिना, परंतु गुहा 16 च्या संदर्भात, ते सध्याच्या बोगद्याच्या पायऱ्या दर्शवितात; घरमुख [३८] घरमुख = दर्शनी भाग; भित्ति [३९] भित्ति = भिंत.
चला आपण दुसऱ्या एका मूलभूत प्रश्नाकडे वळूया. लेणी कधी बांधल्या गेल्या? दुर्दैवाने, हा प्रश्न अजूनही तपासला जात आहे आणि त्यावर वादविवाद सुरू आहेत. जवळजवळ दोन शतकांच्या अभ्यासानंतरही, कोणतीही अचूक स्पष्टता नाही. आपल्याकडे जे आहे ते वेगवेगळे आहे. काही प्रमुख मते येथे वस्तुनिष्ठपणे मांडली आहेत. कोणालाही स्पष्ट कल्पना दिसत नाही. तिसऱ्या शतकापासून ते सातव्या शतकापर्यंत अनेक टप्पे आणि शतके सांगितल्यानंतर, [40] तज्ञांनी अजिंठा दोन वेगवेगळ्या कालखंडातून विकसित झाली यावर सहमती दर्शविली. पारंपारिकपणे, दोन्ही कालखंडांना हीनयान आणि महायान म्हटले जाते. या प्रकारचे वर्गीकरण, कालखंड आणि नामकरण आता समस्याप्रधान असल्याचे आढळून आले आहे, कारण दोन्ही संज्ञांचे अचूक अर्थ गहन पुनरावलोकनाखाली आले आहेत. [41] वादविवाद मिटल्याशिवाय, काही विद्वानांना 'पूर्वीचा' टप्पा आणि 'नंतरचा' टप्पा या संज्ञा वापरणे अधिक सुरक्षित वाटते. [42] दोन्ही टप्प्यांचा कालावधी काय आहे? हे देखील पूर्णपणे स्पष्ट नाही.
अलिकडेपर्यंत, आम्ही सुरुवातीच्या टप्प्यासाठी सुमारे दोन ते तीन शतके मानली होती: तिसरे शतक ईसापूर्व ते पहिले शतक ईसापूर्व. [43] तथापि, सध्याच्या संशोधनात असे मत निर्माण होत आहे की पूर्वीच्या गटातील पाच इमारती, म्हणजेच लेणी 9, 10, 12, 13 आणि 15A [44] (आकृती 5), पहिल्या शतक ईसापूर्व मध्ये ठेवल्या पाहिजेत. [45] एमके ढवळीकर यांनी सध्या असा विचार व्यक्त केला आहे की 'अजिंठा लेण्यांचा प्रारंभिक गट (हीनयान) कदाचित पहिल्या शतक ईसापूर्वच्या उत्तरार्धात सातकर्णी II च्या कारकिर्दीत कोरला गेला असावा' (ढवळीकर 2003, 4). गुहा 10 च्या खडकात कोरलेल्या दर्शनी भागावरील छेदन केलेल्या शिलालेखात 'वासितीचा मुलगा' याने लाकडी दर्शनी भाग दान केल्याची नोंद आहे. [46] सांची येथेही याच नावाचा एक देणगीदार सापडतो: 'दक्षिणेकडील प्रवेशद्वारावरील एक शिलालेख, जो सर्वात प्रभावी आहे, तो नोंदवतो की "हे राजा सिरी-सतकर्णीच्या कारागिरांचा प्रमुख ( अवेशानिन ) वासिथी (वसिष्ठी, स्कॉर्लंड) यांचा मुलगा आनंद यांची देणगी होती" (धवळीकर २००३, ४). दोन्ही शिलालेख एकाच व्यक्तीकडे निर्देश करतात की नाही हे आम्हाला माहित नाही, परंतु जर ते असतील तर अजिंठा आणि सांची प्रवेशद्वारांचा समकालीन काळ मानला पाहिजे. कला, शैली आणि प्रतिमाशास्त्र (झिन २००३) यासारख्या अतिरिक्त स्त्रोतांच्या आधारे मोनिका झिन देखील या डेटिंगचे समर्थन करण्यास इच्छुक आहेत. डायटर श्लिंगलॉफ यांनी दाखवून दिले आहे की दुसऱ्या शतकात भरहुत, अमरावती, नागार्जुनीकोंडा [47] , सांची, मथुरा, गांधार आणि अजिंठा (श्लिंगलॉफ २०१३, खंड II, ४-१३) यांच्यामध्ये कथा आणि प्रतिमाशास्त्रीय संग्रहाचा एक समान संच होता. मूर्तीशास्त्रीय संगतींच्या आधारे, श्लिंगलॉफ यांनी अजिंठाचा प्रारंभिक टप्पा दुसऱ्या शतकातील ईसापूर्व आहे (श्लिंगलॉफ २०१३, खंड II, ३).
यावेळी, अजिंठा प्रदेश सातवाहन शासकांच्या अधिपत्याखाली आला. त्यांची राजधानी प्रतिष्ठान (आधुनिक पैठण) येथे होती, जी अजिंठापासून जवळजवळ १६० किमी अंतरावर आहे. प्राचीन महामार्ग बौद्ध, हिंदू आणि जैन धर्माच्या तीर्थक्षेत्रांना जोडत होते. अजिंठा उत्तरापथ आणि दक्षिणापथ यांच्या भेटीच्या ठिकाणी होता. [48] अशाप्रकारे, व्यापारी, सैन्य आणि लोकांचे प्रवासी काफिले अशा ठिकाणी थांबत असत जिथे नयनरम्य धबधबे असलेल्या महामार्गांजवळ होते.
सातवाहन शासक कला आणि संस्कृतीचे महान संरक्षक होते. त्यांनी हिंदू स्मारकांइतकेच बौद्ध स्मारकांनाही संरक्षण दिले. तथापि, अजिंठा निर्मितीत सातवाहनांचा थेट सहभाग होता असे सूचित करणारा कोणताही पुरावा नाही. शिलालेखातील नोंदी दर्शवितात की अजिंठा पहिल्या टप्प्याचा विकास सामूहिक संरक्षणाच्या सद्गुणाने झाला. अनेक गुहांमध्ये कातडी आणि रंगीत शिलालेख आढळतात जे दर्शवितात की वेगवेगळ्या देणगीदारांनी इमारतींच्या वेगवेगळ्या भागांसाठी पैसे दिले. अशाप्रकारे, अजिंठा पहिल्या टप्प्यात कोणतेही शाही संरक्षण नव्हते. हे सर्व व्यापारी, व्यापारी, सामान्य लोक, उपासक (सामान्य लोक) आणि स्वतः भिक्षूंनी केले.
राजेशाही सहभागाचा कोणताही संदर्भ सापडत नसल्याने, अजिंठाच्या पहिल्या टप्प्यातील राजकीय पार्श्वभूमी किंवा कोणत्याही राजवंशाबद्दल बोलणे अनावश्यक ठरेल. म्हणून, आपण अजिंठाच्या दुसऱ्या टप्प्याकडे वळूया.
दुसऱ्या गटातील लेण्यांचे वय कमी समस्याप्रधान नाही. आपण अगदी सैल शब्दात मोजू शकतो की नंतरच्या टप्प्यात सुमारे २५ लेणी उत्खनन करण्यात आली होती. सुरुवातीला, तिसऱ्या शतकापासून ते सातव्या शतकापर्यंत अनेक शतके सांगितली गेली. [49] ही तारीख इतकी खोलवर रुजलेली आहे की अजिंठा लेण्यांवरील युनेस्कोच्या वेबपेजवर अजूनही जुनी तारीख आहे: 'अजिंठा येथील पहिले बौद्ध गुहा स्मारके इ.स.पू. दुसऱ्या आणि पहिल्या शतकातील आहेत. गुप्त काळात (इ.स.चे पाचवे आणि सहावे शतक ), मूळ गटात अनेक समृद्ध सजवलेल्या लेण्या जोडल्या गेल्या' (युनेस्को १९९२-२०१५). भारतीय पुरातत्व सर्वेक्षणाची वेबसाइट अधिक कल्पक आहे: 'लेणी वेगवेगळ्या काळात (इ.स.पू.चे दुसरे शतक ते इ.स.चे सहावे शतक) उत्खनन करण्यात आली . . . . चित्रांचा दुसरा टप्पा इ.स.च्या पाचव्या ते सहाव्या शतकापर्यंत सुरू झाला आणि पुढील दोन शतकांपर्यंत चालू राहिला. . . . वाकाटक काळातील या अनुकरणीय चित्रांचा नमुना गुहा क्रमांक १, २, १६ आणि १७ मध्ये दिसून येतो (भारतीय पुरातत्व सर्वेक्षण २०११). दुसऱ्या शब्दांत, एएसआय असा विश्वास ठेवते किंवा लोकांना असे मानावे असे वाटते की वाकाटकांनी आठव्या शतकापर्यंत राज्य केले!
आजकाल बरेच विद्वान पाचव्या शतकातील किंवा पाचव्या शतकाच्या उत्तरार्धातील काळ हे वय मानतात. [50] तथापि, ए.पी. जामखेडकर यांचे डेटिंग एक प्रकारचे आहे: 'अजिंठा दगडात कोरलेल्या लेण्या सुमारे ७०० वर्षांच्या निर्मिती आहेत, अंदाजे २०० ईसापूर्व ते इ.स. ५२५ पर्यंत' (२००९). वॉल्टर एम. स्पिंक यांनी या वयाचे श्रेय विशिष्ट शब्दांत दिले आहे. ते म्हणतात की नंतरच्या काळातील सर्व लेण्या सुमारे ४६२ ते ४८० ईसापूर्व दरम्यान विकसित केल्या गेल्या. तथापि, ते स्पष्ट करतात की 'सोप्यासाठी, मी विशिष्ट तारखा वापरल्या आहेत, जरी वाचकाने एक किंवा दोन वर्षांच्या त्रुटीचा फरक सोडावा - कदाचित प्रत्येक असाइनमेंटसाठी जास्त नाही' (डब्ल्यूएम स्पिंक २००५, xi). पुढे, '... अजिंठाच्या प्रत्येक वैशिष्ट्यासाठी आपण ज्या "विशिष्ट" तारखा लागू केल्या आहेत त्या कधीही पूर्णपणे अचूक असल्याचा दावा करू शकत नाहीत, कारण संपूर्ण दिनांकित क्रम विशिष्ट दिनांकित टर्मिनीवर अवलंबून आहे जो अजंठाच्या संरक्षणाच्या कालावधीपेक्षा किंचित पूर्वीचा आणि थोडासा नंतरचा आहे. म्हणून या बाह्य मर्यादांच्या संदर्भात अजंठाच्या विकासाचे क्रम लावले पाहिजे' (डब्ल्यूएम स्पिंक २००५, २). स्पिंकचा 'लघु कालक्रम' त्याच्या बहुतेक प्रकाशनांमध्ये आढळू शकतो. त्याचा नवीनतम सुधारित कालक्रम चार्ट (स्पिंक आणि यागुची २०१४, xii) मध्ये आढळू शकतो. सुरुवातीला त्याच्या तारखेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले गेले होते. [५१] तथापि, काही लेखकांनी अलीकडेच त्याच्या तारखेचा स्वीकार केला आहे ज्यात हान्स बेकर, [५२] नाओमिची यागुची (Sahapedia.org २०१५) आणि सध्याचे लेखक [५३] यांचा समावेश आहे . स्पिंकने असा प्रस्ताव मांडला आहे की पाचव्या शतकातील सर्व लेण्या एकाच राजाच्या कारकिर्दीत सुरू झाल्या आणि मोठ्या प्रमाणात पूर्ण झाल्या ज्याच्या अधिपत्याखाली अजिंठा हे ठिकाण आले. राजाचे नाव हरिषेण (हरिषेण) होते. भारताच्या इतिहासाच्या अगदी जवळ या राजाला स्थान आहे. [54] परंतु स्पिंकसाठी: 'प्राचीन विदर्भात (पूर्व महाराष्ट्रात) केंद्रित असलेली हरिषेण निश्चितच भारतातील आणि कदाचित त्या वेळी संपूर्ण जगात सर्वात महान होती. त्याच्या कारकिर्दीच्या अखेरीस, त्याचे वर्चस्व पश्चिमेकडून पूर्वेकडील समुद्रापर्यंत संपूर्ण मध्य भारतावर पसरले होते' (डब्ल्यूएम स्पिंक २००५, ७). वाकाटक साम्राज्याचा स्पिंकचा नकाशा आकृती ३ मध्ये येथे पुनरुत्पादित केला आहे.
अजिंठा येथील दोन शिलालेख, एक गुलवाडा येथील घटोत्कच गुंफेतील आणि शेजारच्या धुळे जिल्ह्यात सापडलेल्या थाळनेर अनुदानात हरिषाच्या राजवटीचा उल्लेख आहे. अजिंठा गुहा 16 शिलालेख, वि. 17: हरिरामहरस्मरेन्दुकान्तिर्हरिषेणो हरिविक्रमप्रतापः, हरिरामहरस्मरेन्दुकान्तिर्हरिषेणो हरिविक्रमप्रतापः , 'त्यानंतर त्याचा मुलगा राजा झाला [. . .] हरिषेण, जो, प्रेमात, इंद्र, राम, हर, कामदेव आणि चंद्रासारखा दिसत होता आणि जो सिंहासारखा शूर आणि उत्साही होता' (मिराशी, वाकाटकांचे शिलालेख, कॉर्पस इंस्क्रिप्शनम इंडिकारम मालिका 1963, 108)108, घटोत्कच गुंफा शिलालेख, वि. १३: अथ देवराजसूनुर्हरिषेणो […] हस्तिभोज, ' अथ देवराजसूनुर्हरीसेनो [. . .] हस्तिभोज , त्यानंतर देवराजाचा पुत्र हरिषेण आहे [...] हस्तिभोज' (मिराशी १९६३, ११७, ११९). गुहा 17 शिलालेख, वि. 21: … वदनारविन्दचंद्रे [।*] परिपालयति क्षितीन्द्रे हरिषेणे हितकारिणी प्रजानाम् [२१ ॥*], … वदनारविंदचंद्रे [|*] परिपालयति क्षितींद्रचंद्रे हरिष्टिकृत प्रजानां , 'राजकन्यांमध्ये तो चंद्र असताना, हरिषेण, ज्याचा चेहरा कमळ आणि चंद्रासारखा आहे आणि जो (त्याच्या) प्रजेसाठी हितकर असे करतो. . .] पृथ्वीचे रक्षण करत आहे' (मिराशी, वाकाटकांचे शिलालेख, कॉर्पस इंस्क्रिप्शनम इंडिकेरम सिरीज 1963, 126, 129). हरिषेणाच्या कारकिर्दीबद्दल, बर्गेस यांनी लिहिले: 'पंडित भगवानलाल कदाचित असे गृहीत धरतात की २१ व्या ओळीत उल्लेख केलेला हरिषेण हा वाकाटक राजपुत्र आहे ज्याचे नाव अजिंठा [शिलालेख] क्रमांक ३ मध्ये आढळते आणि वाकाटक हे सर्वोच्च अधिपती होते ज्यांचे पालन या राज्यकर्त्यांनी केले [राजा उपेंद्रगुप्त दुसरा किंवा धाराधिप, गुहे १७ चे दाता]' (बर्गेस १८८३, १२८).
सुमारे ४६० इसवी सन होता जेव्हा महाराज [५६] हरिषेण (महाराज हरिषेण) पश्चिम वाकाटक साम्राज्याच्या [५७] सिंहासनावर आले . [५८] हरिषेण हा किमान वाकाटक राजवंशाचा (तुलनात्मक कालगणनेसाठी, तक्ता १ पहा) सर्वात महान शासक बनला असे दिसते. राजवंशाची सुरुवात सामान्य होती. तथापि, हरिषेण महत्त्वाकांक्षी होता. सत्तेवर आल्यानंतर एक-दोन वर्षातच त्याने विविध दिशांना अनेक देशांवर हल्ला करून विजयी मोहीम सुरू केली. त्याचे वारसा मिळालेले राज्य मध्य दख्खनच्या एका भागात मर्यादित होते ज्याची अचूक रूपरेषा निश्चितपणे निश्चित करता येत नाही. त्याच्या कारकिर्दीत, वाकाटकांच्या वत्सगुल्म शाखेने नंदीवर्धन शाखेवर वर्चस्व गाजवले. दुसऱ्या शाखेचे शासक असलेले राजा नरेंद्रसेन आणि राजा पृथ्वीसेन दुसरा यांना संपवण्याचा कोणताही प्रयत्न करण्यात आला नाही, कारण ते दायद (सामान्य वंशाचे लोक) होते. महाराजा हरिषेण यांचे 'सचिव' (सचिव), ज्यांना काही लेखकांनी पंतप्रधान असे टोपणनाव दिले आहे, ते वराहदेव होते ज्यांनी गुलवाडा येथील अजिंठा गुहा १६ आणि घटोटकच गुहा मंदिरे विकसित केली आणि ती बौद्ध संघाला दान केली . [59] त्यांनी सुंदर गुहा मंदिरांच्या बाह्य आणि पोर्च भिंतींवर लांबलचक छाटलेले शिलालेख सोडले आहेत जे त्यांच्या देणग्या घोषित करतात. [60] एकत्रितपणे ते वराहदेव आणि महाराजा हरिषेण यांची वंशावळ प्रदान करतात. गुहा १६ दान शिलालेखांमध्ये प्रथाप्रमाणे हरिषेणाची प्रशस्ती (स्तवन) प्रदान करते. ते काव्यात्मक श्लोकांमध्ये रचलेले आहेत.
हरिषेण महत्त्वाचे आहेत कारण ते स्पष्टपणे बौद्ध धर्माचे समर्थक होते. स्पिंकच्या मते, ते अजिंठा येथील संरक्षण कार्यात थेट सहभागी होते. ते असे मानतात की 'गुहा १ ला स्वतः महान वाकाटक सम्राट हरिषेण यांनी प्रायोजित केले होते' (डब्ल्यूएम स्पिंक २००७, ७).
अजिंठा येथील वराहदेवाच्या देणगीदार शिलालेखातील १८ व्या श्लोकात अनेक प्राचीन देशांची किंवा प्रांतांची नावे आहेत: 'तो [हरिषेण] (जिंकला), कुंतल, अवंती, कलिंग, कोशल, त्रिकूट, लाट, आंध्र[परांट]... जे शौर्यासाठी खूप प्रसिद्ध असले तरी...' [61] ठिकाणांची नावे ओळखली गेली आहेत [62] (आकृती २). तथापि, गहाळ किंवा अस्पष्ट शब्दांमुळे वेगवेगळी मते निर्माण झाली आहेत. त्याचा थोडक्यात आढावा खाली दिला आहे.
या श्लोकात नामांकित देशांबद्दल एक मुद्दा मांडण्याचा हेतू आहे. परंतु क्रियापद गहाळ आहे. बुहलर आणि मिराशी यांनी असा अंदाज लावला की हरवलेल्या क्रियापदाचा अर्थ विजय असा होतो आणि त्यांनी असा निष्कर्ष काढला की हरिषेणाने नामांकित प्रांत जिंकले असावेत. नंतरच्या संशोधनात, स्पिंकने या अनुमानाला तथ्य म्हणून स्वीकारले. ते म्हणतात की हरिषेण 'पाचव्या शतकाच्या मध्यातील सर्वात महान शासक होता; त्याच्या संक्षिप्त कारकिर्दीच्या अखेरीस ( सुमारे ४६०-४७७ इ.स.), मध्य भारतातील त्याचे राज्य समुद्रापासून समुद्रापर्यंत पसरले होते' [(स्पिंक आणि यागुची २०१४, १) (डब्ल्यूएम स्पिंक २००९, आकृती १)]. स्पिंकसाठी, शिलालेखाच्या दाव्यावर शंका घेण्यास जागा नाही. परंतु, डीसी सिरकरसाठी: 'हा एक अस्पष्ट दावा आहे, जो त्या देशांशी वाकाटक राजाचे काही प्रकारचे शत्रुत्वपूर्ण संबंध दर्शवू शकतो. हरिषेणाने देश पूर्णपणे ताब्यात घेतले होते असे मानणे अशक्य आहे (सरकार १९६५, अंक २). स्पिंक यांना वाकाटक शिलालेखकार ए.एम. शास्त्री यांचे मत पटत नाही, जे काही प्रमाणात सिरकर यांच्या मताचे प्रतिध्वनी करतात:
हे शक्य आहे की त्याने [हरिषेणाने] यापैकी काही प्रदेशांवर घाईघाईने छापे टाकले, ज्यांचे रूपांतर कवीने पूर्ण विजयांमध्ये केले आणि त्यात काही इतर प्रदेश जोडले जिथे त्याचे संबंध होते किंवा ज्यांच्याशी त्याचा लष्करीदृष्ट्या काहीही संबंध नव्हता. म्हणूनच, दरबारी कवीच्या अन्यथा अप्रमाणित विधानाच्या आधारे असे म्हणणे चुकीचे ठरेल की 'उत्तरेला माळवा ते दक्षिणेला कुंतला आणि पश्चिमेला अरबी समुद्रापासून पूर्वेला बंगालच्या उपसागरापर्यंत संपूर्ण दख्खनमध्ये हरिशेणाचे वर्चस्व मान्य होते' [63] किंवा पाचव्या शतकाच्या उत्तरार्धात 'तो जगातील सर्वात महान शासक होता' [64] असे म्हणणे चुकीचे ठरेल. आपण अधिक तर्कसंगतपणे असे म्हणू शकतो की त्याने त्याच्या वडिलांनी सुरू केलेल्या प्रक्रियेला तार्किक निष्कर्षापर्यंत पोहोचवले, वाकाटकांच्या दुसऱ्या शाखेच्या प्रदेशावर आपला अधिकार स्थापित करून, पृथ्वी शेण दुसरा, त्याचा शेवटचा ज्ञात सदस्य, किंवा त्याचा उत्तराधिकारी, जर असेल तर, किंवा वारसाच्या अपयशामुळे जास्त प्रतिकार न करता आपोआपच त्याला पदच्युत करून. आपण असाही निष्कर्ष काढू शकतो की काही काळासाठी, तो कितीही कमी काळ असला तरी, तो एक असा राजा होता ज्याला त्याच्या महान लष्करी सामर्थ्याबरोबरच त्याच्या मानवी गुणांमुळे त्याच्या समकालीन लोकांमध्ये खूप उच्च आदर होता. [(शास्त्री १९९७, २०५)]
चला हंस बेकर यांचे मत देखील पाहूया ज्यांचे विचार सरकार आणि शास्त्री यांच्याशी सुसंगत आहेत:
हरिषेणाच्या संदर्भात उपलब्ध असलेल्या स्त्रोतांमध्ये किंवा त्याच्या कथित विरोधकांच्या स्त्रोतांमध्ये, आपल्याला या कथित असाधारण लष्करी कामगिरीची पुष्टी कुठेही आढळत नाही, जी ऐतिहासिक वास्तवात कधीही घडली असण्याची शक्यता कमी आहे. या श्लोकातून असे सूचित होते की वाकाटक राजा आजूबाजूच्या सर्व राजांना मागे टाकत होता किंवा त्यांना लाजवत होता. [65] [ (बेकर 1997, 34-35)]
हरिषेणाच्या अधिपत्याबद्दल बेकरची कल्पना खालील टिपण्णीतून स्पष्ट होते:
जरी हरिषेणाच्या साम्राज्यवादी कारनाम्यांना पुरेसा शिलालेखीय आधार नसला तरी, हा श्लोक त्याच्या विस्तारवादी महत्त्वाकांक्षेला अधोरेखित करतो आणि त्याचे पहिले बळी त्याचे पूर्वेकडील नातेवाईक नरेंद्रसेन असू शकतात... [श्लोक] त्या प्रदेशांचा उल्लेख करत नाही ज्यांच्यासाठी आपल्याला काही सकारात्मक पुरावे आहेत की ते हरिषेणाच्या अधिपत्याखाली आले होते, म्हणजेच अश्मक आणि पूर्वेकडील वाकाटक राज्य. हरिषेण किंवा त्याच्या जागी त्याच्या मंत्र्याने त्यांचा उल्लेख केला नाही, सर्वप्रथम कारण शिलालेख कदाचित त्याच्या विजयांचा संदर्भ देत नाही, जसे आपण आत्ताच युक्तिवाद केला आहे. पुढे, त्यांना असे म्हणून निर्दिष्ट करणे लाजिरवाणे वाटले असेल, कारण त्यामुळे वत्सगुल्मच्या राज्याचा एक स्पष्ट भाग असल्याचा दावा संशयास्पद वाटला असेल. [(बकर १९९७, ३५)]
स्पिंकच्या विरोधकांना अंत नाही. आणखी एक वाकाटक शिलालेखकार, ब्रह्मानंद देशपांडे यांनी स्पिंकच्या रचनांचा गाभा नाकारला आहे. [66]
तथापि, काही अभ्यास स्पिंकच्या व्यापक निष्कर्षांना पुष्टी देतात. काही उद्धृत करायचे झाले तर, शोभना गोखले यांनी हरिषेणाच्या विस्तारवादाच्या पुराव्यांचा अभ्यास केला आहे (गोखले १९९२). शास्त्री (१९९७), एलएस निगम (२००४) आणि डोनाल्ड एम. स्टॅडटनर (२००४) यांचा असा विश्वास आहे की हरिषेण किंवा त्यांच्या समकालीनांनी, जरी थोडक्यात असले तरी, दक्षिण कोशल (छत्तीसगड) या प्राचीन देशावर हल्ला केला होता. जर हरिषेणाच्या कान्हेरी आणि दक्षिण कोशलवरील विजयाचे सिद्धांत स्वीकारले गेले तर त्याच शिलालेखात दावा केल्याप्रमाणे इतर प्रदेशांचे विजय देखील स्वीकारले पाहिजेत. आणखी एक संबंधित मुद्दा बेकर यांनी मांडला आहे. तो म्हणतो की हरिषेणला कदाचित आधीच अश्मक, ऋषिक आणि मूलक प्रांत वारशाने मिळाले असतील, त्यामुळे छापा टाकलेल्या देशांच्या यादीत त्यांचा उल्लेख करण्याची गरज नव्हती. आपण येथे सर्व तपशीलांमध्ये जाऊ शकत नाही. अलीकडेच, स्पिंकने सर्व स्त्रोतांचे तपशीलवार विश्लेषण केले आहे आणि विशेषतः वाकाटक युगाच्या समाप्तीदरम्यान राजकीय पार्श्वभूमीच्या संभाव्य चित्राचा व्यापक आढावा दिला आहे (डब्ल्यूएम स्पिंक २००५, ११९-१६२).
अजिंठा शिलालेखांमध्ये दोन विशिष्ट प्रांतांचा उल्लेख आहे: ऋषिक (ऋषिक) आणि अश्मक (अश्मक). गुहा १७ [६७] आणि गुहा २० [६८] मधील देणगी शिलालेखांवरून कळते की, ऋषिकाच्या राजाने कदाचित लेण्या १७-२० (आकृती ६) दान केल्या असतील. ऋषिक देशाचे आराखडे मुख्यतः खांडेश प्रदेशात होते आणि अजिंठा हे ठिकाण ऋषिक आणि घाटांच्या वरच्या शेजारच्या देशाच्या सीमेवर होते , म्हणजेच औरंगाबाद प्रदेश ज्याला मिराशी (मिराशी १९६३, प्लेट पाच) यांनी मूलक आणि स्पिंक यांनी अश्मक म्हटले आहे. गोदावरीच्या दक्षिणेकडील प्रदेश ज्यामध्ये अहमदनगर आणि भीर जिल्ह्यांचा समावेश आहे, मिराशी (1963, 123, 124) आणि शास्त्री (1997, 48) यांनी अस्माका म्हणून ओळखले आहे, परंतु स्पिंकसाठी ते मूलका आहे. केवळ पुढील संशोधन यापैकी कोणती ओळख वैध आहे याची पुष्टी करेल. 17, 18, 19 आणि 20 लेण्यांचे दान देणाऱ्या आणि 'पृथ्वीला स्तूप आणि विहारांनी सजवणाऱ्या' शिषिक देशाच्या राजाच्या नावाचा विविध अर्थ लावण्यात आला आहे. गुहा 17 शिलालेख, श्लोक 9 मध्ये उल्लेख आहे: 'धराधिपारख्यां प्रथमो बभार दध्रे द्वितीयो [र*]विसाम्ब संज्ञाम ॥ [९ ॥*], धाराधिपाराख्यां प्रथमो बाबर दध्रे द्वितीयो [र*]विसाम्ब संजाम || [९||*], त्यापैकी थोरल्याला ( त्यापैकी ) राजाची पदवी होती, तर दुसऱ्याला रविसंबा' (मिराशी १९६३, १२५, १२८) असे नाव होते. मिराशी (मिराशी १९६३, १२२), थोरल्याचे, म्हणजेच दात्याचे नाव हरवले आहे. मिराशीच्या नाव-हरवलेल्या सिद्धांतावर विश्वास ठेवून आणि गुहा २० च्या शिलालेखाशी संबंध जोडून, स्पिंकने असा अंदाज लावला आहे की मोठ्या भावाचे नाव उपेंद्रगुप्त आहे (डब्ल्यूएम स्पिंक २००५, २०३ ff.). तथापि, शास्त्री हे नाव धाराधिप असल्याचे ओळखतात. त्यांनी दात्याची एक वेगळी वंशावळ चार्ट तयार केली आहे (शास्त्री १९९७, ४७) ज्यामध्ये खालील स्पष्टीकरण दिले आहे:
मिराशी म्हणतात की रविसंबा यांच्या मोठ्या भावाचे नाव, जे कुटुंबातील शेवटचे ज्ञात सदस्य होते, जतन केलेले नाही, जरी त्यांना 'राजाची पदवी होती.' पहिल्या राजपुत्राच्या ( कुमार ) संबंधात वापरले जाणारे धाराधीप-आख्यम हे वाक्य 'धाराधीप नावाचा' असे दर्शवते, अगदी त्याचप्रमाणे रविसंबा-संज्ञाम दुसऱ्या मुलासाठी वापरला जातो आणि 'रविसंबा' असे नाव धारण करतो असा योग्य अर्थ घेतला जातो. 'पृथ्वीचा स्वामी', 'धराधीप' हे नाव असामान्य मानले जाऊ नये कारण नरेंद्र, 'माणसांचा स्वामी' आणि भूपती किंवा अवनींद्र, 'पृथ्वीचा स्वामी' अशी नावे व्यक्तींनी धारण केली आहेत. रविसंबा यांच्या अकाली निधनाने अत्यंत दुःखी झालेल्या, [] मोठा भाऊ धाराधीप यांना सांसारिक सुख आणि संपत्तीबद्दल तीव्र तिटकारा निर्माण झाला आणि त्यांनी बौद्ध धर्माला समर्पित धार्मिक जीवन जगले. त्याने आपले राज्य स्तूप आणि विहारांनी व्यापले आणि दात्यांना दानधर्म केले. [ (शास्त्री १९९७, ४७-४८)]
बेकर (बेकर १९९७, ३६) देखील त्याला धाराधिप म्हणतो: 'मोठ्या भावाचे "नाव" विचित्र आहे: धाराधिप (म्हणजे "पृथ्वीचा स्वामी," किंवा "राजा"). बेकर खालील कारणांमुळे स्पिंकचे वाचन नाकारतात:
गुहेच्या XVII मधील शिलालेखाची हाताळणी करताना, स्पिंक मिराशीपेक्षा एक पाऊल पुढे जातो जेव्हा तो 'राजा' नावाच्या मोठ्या भावाची ओळख XX गुहेच्या दात्याशी करतो. नंतरच्या गुहेत एक अतिशय तुकडा देणगीदार शिलालेख सापडतो [(छब्रा १९५२, ११३)] ज्यामध्ये उपेंद्र हे नाव असल्याचे दिसते, जो कदाचित एका माणसाचा मुलगा आहे ज्याचे नाव कृष्णाने सुरू झाले असावे. रविसंबा आणि त्याच्या अनामिक भावाच्या वंशातील पूर्वजांपैकी एकाचे (पणजोबा) उपेंद्रगुप्त असे नाव आहे; म्हणून स्पिंक असा अंदाज लावतो की मोठ्या भावाचे नाव त्याच्या नावावरून ठेवले गेले असावे, अशा परिस्थितीत गुहेच्या XX च्या शिलालेखातील वडिलांचे नाव, ज्याचे नाव 'कृष्ण' ने सुरू झाले असावे, ते 'कृष्णदास' असे वाचले पाहिजे. तथापि, गुहेच्या XX मधील शिलालेख इतका वाईट स्थितीत आहे की त्यावरून कोणतीही विश्वसनीय माहिती मिळवता येत नाही; शिवाय, गुहा XX ही गुहा XVII किंवा गुहा XIX नाही. म्हणून स्पिंकच्या सिद्धांताला केवळ कल्पक अनुमान म्हणून मानणे कठीण आहे. [(बेकर 1997, 38)]
प्राचीन महामार्गांनी ऋषिक, अश्मक आणि मूलक यांना उर्वरित भारताशी जोडले होते. भिक्षू बुद्धभद्र यांनी दान केलेल्या गुहेच्या २६ व्या शिलालेखात अश्मक प्रांताचे नाव नमूद केले आहे. खरं तर, दात्याने अश्मकराजाचे मंत्री भवविराज यांच्या सन्मानार्थ स्मारक उभारले होते, जसे आपल्याला श्लोक ९-१३ मध्ये सांगितले आहे:
अनेकजन्मान्तरबद्धसौहृदम् स्थिरम् कृतज्ञं सुधियम् विपश्चितम [|*] सुरासुराचार्यमतेषु कोविदम् महानुभावाश्मकराजामन्त्रीण || [९ ||*] . . . तम भव्विराजम उद्दिश्य मातापितरामेव च [|*] भिक्षुणा बुद्धभद्रेण कारितः सुगतालयम् [१३।*] [६९]
' अनेक-जन्म-अत्ता(नता)र-बध्द-सौह्रदम स्थिरम कृतजंम सुधीयांम विपश्चितम् [|*] सुर-आसुर-आचार्य (र्य) -मातेषु कोविदंश-महानुभमान-काव्यम् || [९ ||*] . . . तम् भवविराजम् उद्दिश्य माता-पितरम-एव च [|*] भिक्षुणा बुद्धभद्रेणा करित: सुगत-आ[लयं] [१३ ||*]
भिक्षू बुद्धभद्र यांनी सुगताचे हे मंदिर त्यांच्या पालकांच्या सन्मानार्थ आणि (त्या) भावविराजाच्या सन्मानार्थ बांधले आहे ज्यांनी अश्माकाच्या पराक्रमी राजाची सेवा केली होती आणि अनेक जन्मांपासून त्यांच्याशी मैत्रीने जोडलेले होते...' [ (छब्रा १९५२, ११५-११६, ११८)]
वर पाहिल्याप्रमाणे, भिक्षू बुद्धभद्र पुढे नोंदवतात की ते सलग अनेक जन्मांतून मंत्र्याशी संलग्न होते. कदाचित, बुद्धभद्र अश्मक देशाचे होते किंवा तिथून आले होते. अशाप्रकारे, अजिंठामध्ये ऋषिक आणि अश्मक प्रांतांची भूमिका होती याचा थेट पुरावा आहे.
इतर प्रांतांच्या किंवा इतर प्रांतातील लोकांच्या सहभागाबद्दल, असा कोणताही थेट पुरावा नाही. कारण इतर प्रमुख देणगीदारांची नावे ज्ञात नाहीत. तथापि, आपल्याला गुहा ४ [७०] च्या मंदिर बुद्ध प्रतिमेच्या शिलालेखात एका माथुर (माथुर) चे नाव मिळते , परंतु त्याने फक्त मंदिराचा भाग दान केला की संपूर्ण इमारत हे दान केले हे अनिश्चित आहे. असामान्य स्थान आणि देणगीदार शिलालेखासाठी असामान्यपणे कमी लांबीमुळे शंका आहे. माथुर हे भारतात खूप लोकप्रिय आडनाव आहे, परंतु येथे ते पहिले नाव आहे. बहुतेकदा, भारतातील अनेक लोकांची नावे अजूनही मूळ ठिकाणांशी जोडली जातात. आम्हाला आश्चर्य वाटते की माथुर हे मथुरा येथील होते का. उर्वरित लेण्यांसाठी, आपण केवळ शैलीत्मक, प्रतिमाशास्त्रीय आणि तीर्थयात्रेच्या मार्गांवरून असा अंदाज लावू शकतो की इतर देणगीदार आर्यवर्त [71] , बृहत्तर मगध [72] , अनुप, कोशल, अवंती, लाट, मूलक, विदर्भ, कुंतल, अपरांत, आंध्र आणि कलिंग यासारख्या दूरवरच्या प्रदेशातून आले असतील.
पाचव्या शतकातील भारतातील संरक्षण क्रियाकलापांची खरी व्याप्ती आणि विविधता यांचे आरेखन करणे शक्य झालेले नाही. कला आणि संस्कृतीला गुप्त संरक्षणाची कहाणी तुलनेने सर्वज्ञात आहे. तथापि, वाकाटक संरक्षणाचे काही काम प्रगतीपथावर आहे. आता वाकाटक इतिहासकारांना हे चांगलेच समजले आहे की भारताचा 'सुवर्णयुग' गुप्तांच्या अधिपत्यापलीकडे पसरलेला होता. विशेषतः पाचव्या शतकातील अजिंठा काळात, गुप्त उत्तर भारतापुरते मर्यादित होते आणि मध्य भारत आणि दख्खनमधील त्यांच्या पूर्वीच्या अधिपत्याचा मोठा भाग वाकाटकांच्या दोन शाखांच्या नियंत्रणाखाली होता. विशेषतः, हरिषेण काळात, वाकाटकांचा मोठा विस्तारवाद होता जो केवळ काही काळ टिकला, दोन दशकांपेक्षा कमी काळ टिकला. एकूणच, पाचव्या शतकातील वाकाटक मोठ्या प्रमाणात संरक्षण क्रियाकलाप निर्माण करू शकले किंवा त्यांना परवानगी दिली. अजिंठा हे फक्त हिमनगाचे एक टोक आहे. विद्यमान पुरातत्व, शिलालेख, अंकशास्त्र, [73] आणि कला ऐतिहासिक संग्रह हे सूचित करण्यासाठी पुरेसे आहेत की वाकाटकांच्या दोन्ही शाखांमधील संरक्षण बरेच विपुल आणि सुसंगत होते. बौद्ध तसेच ब्राह्मणीय [74] संरक्षणात सुसंगतता समान आहे. सध्याच्या विद्वत्तेतही, अजिंठा आणि हरिषेण यांनी सर्व प्रकाशझोतात आणले आहे हे केवळ इतिहासाचे विकृतीकरण आहे.
वाकाटकांच्या दोन्ही शाखांच्या विविध ज्ञात संरक्षण कार्यांचा आढावा घेणे येथे शक्य नाही. परंतु, अजिंठा यांचे मूल्यांकन नंदीवर्धन शाखेच्या संरक्षणाच्या कला ऐतिहासिक आणि पुरातत्वीय संग्रहाशी तुलना केल्याशिवाय करता येणार नाही. हंस बकर यांनी मानसर, रामागिरी, नगरधन, मंडल आणि प्रवरापुराच्या तुलनेने कमी ज्ञात कला इतिहासाचे विस्तृत सर्वेक्षण केले आहे. [75] बकर यांनी वाकाटकांच्या ब्राह्मणीय वारशावर प्रकाश टाकला आहे. कला आणि पुरातत्वशास्त्राच्या विद्यार्थ्यांनी हे लक्षात ठेवले पाहिजे की आज आपल्याकडे जे आहे ते कधीही पूर्ण चित्र नसते, कारण मोठा, मोठा भाग नष्ट झाला आहे किंवा काही भविष्यात प्रकाशात येण्याची वाट पाहत असतील. माध्यम आणि साहित्याच्या बाबतीत आणखी एक निश्चितता आहे. विद्यमान आणि ज्ञात कला ऐतिहासिक आणि पुरातत्वीय संग्रहाचा मोठा भाग साहित्याच्या आधारे आपल्याकडे आला आहे: दगड किंवा खडक, जसे की परिस्थिती असू शकते. पण, हे एकमेव माध्यम नव्हते. खरं तर, असा युक्तिवाद केला जाऊ शकतो की हे कधीही सर्वात प्रचलित माध्यम नव्हते, कारण दगड किंवा दगडातील कलाकृती इतर माध्यमांपेक्षा आणि साहित्यांपेक्षा जास्त महाग आणि मागणी असलेली असते. कदाचित, लाकूड, विटा आणि इतर नाशवंत माध्यमांमधील मोठा संग्रह कायमचा नष्ट झाला आहे. म्हणूनच, कला ऐतिहासिक नकाशा अपुरा, अपूर्ण आणि अपूर्ण राहणे नशिबात आहे. म्हणून, उपलब्ध संग्रह केवळ मोठ्या, अधिक व्यापक परिस्थितीचे सूचक म्हणून मानले पाहिजे. उदाहरणार्थ, गुहा १७, अजिंठा, श्लोक २२ मधील शिलालेख घ्या, ज्यामध्ये म्हटले आहे: 'त्याने [दात्याने] ... स्तूप आणि विहारांनी पृथ्वी सजवली ... . ' [७६] संपूर्ण शिलालेखातील मजकुराचा विचार करता, तो खोटा दावा वाटत नाही, जरी तो स्पष्टपणे अतिशयोक्ती असला तरी. म्हणून, आम्हाला आश्चर्य वाटते की ते स्तूप कुठे आहेत. [77] अजिंठा शिलालेखांमध्ये दगडात कोरलेल्या मठांना ' एकश्म', ' लयना' किंवा ' शैलगृह' असे म्हटले आहे.
आधी सांगितल्याप्रमाणे, हरिषेण काळात बौद्धांना पुन्हा एकदा आश्रय मिळाला. या स्थळांमध्ये अजिंठा, घटोटकच, औरंगाबाद, बानोटी, बाग आणि कान्हेरी यांचा समावेश होता. हरिषेणपूर्व काळात परिस्थिती कशी होती? संशोधनातील प्रगतीवरून असे दिसून येते की हरिषेण हा त्याच्या कुळातील इतरांपेक्षा वेगळा वाकाटक होता. त्याच्या कारकिर्दीपूर्वी ( सुमारे ४६०-४७७ इ.स.), मोठ्या बौद्ध आश्रयाच्या बाबतीत एक शांतता होती. शांततेच्या काळात, भारताच्या दक्षिणेकडील आणि मध्य राज्यांमध्ये ब्राह्मणवादी लाट पसरली असावी. या शांततेवरून असे दिसून येते की बौद्धांनी संदर्भातील प्रदेशांच्या सांस्कृतिक आणि धार्मिक नकाशात मागे घेतले होते. खरंच, दख्खन, पूर्व आणि पश्चिम भारतातील बौद्ध पुरातत्वशास्त्रात तिसऱ्या ते पाचव्या शतकाच्या सुरुवातीच्या काळात नवीन आणि मोठ्या मठांच्या स्थापनेचा कोणताही मोठा उपक्रम दिसून येत नाही. या काळात, विद्यमान बौद्ध स्थळांमध्ये वापर, पूजा किंवा वस्तीचे फारसे चिन्ह दिसून येत नाही. तथापि, काही जुन्या मठांनी कसे तरी कार्यरत राहणे सुरू ठेवले असेल परंतु प्रश्नातील काळात ताज्या आणि विस्तृत विकासाचे प्रमाण फारसे दिसून येत नाही. एमके धवळीकर यांनी ' लेट हिनयान केव्हज ऑफ वेस्टर्न इंडिया ' (१९८४) या पुस्तकात पश्चिम भारतातील अनेक कमी ज्ञात आणि नव्याने शोधलेल्या स्थळांचे दस्तऐवजीकरण केले आहे ज्याचे श्रेय ते तिसऱ्या ते मध्य पाचव्या शतकाच्या 'अंतराल काळ'ला देतात. ही स्थळे पिटलखोरा, नासिक, जुन्नर, कराड, पोहाळे, वाई, नाडसूर, नेनावली, शिरवाळ, कुडा, महाड, शेलारवाडी, खेड आणि कान्हेरी आहेत. यापैकी कोणत्याही स्थळांची तुलना अजिंठा, वेरूळ, सांची, अमरावती, नालंदा इत्यादींच्या भव्यतेशी करता येत नाही. असे दिसून येते की, ढवळीकरांच्या उत्तरार्धातील हीनयान लेणी वैयक्तिक भिक्षूंसाठी किंवा भिक्षूंच्या लहान गटांसाठी होती. या स्थळांवर बौद्ध संघाच्या अस्तित्वाचा फारसा आवाका नाही .
हरिषेणोत्तर काळात, चित्र खूपच वाईट आहे. सहाव्या शतकातील बौद्ध भारतात आपल्याला कोणतीही लक्षणीय हालचाल दिसून येत नाही. वेरूळच्या सुरुवातीच्या लेण्यांचा काळ अजूनही निश्चित झालेला नाही या वस्तुस्थितीमुळे ही समस्या आणखी वाढली आहे. विशेषतः, वेरूळच्या बौद्ध लेण्यांचा काळ हा एक कठीण काळ होता. पाचव्या ते आठव्या शतकापर्यंतच्या विविध तारखा सांगितल्या गेल्या आहेत. [78] कला, स्थापत्य आणि प्रतिकात्मक आधारावर, वेरूळच्या बौद्ध मंदिरांचे वय अजिंठा येथील हरिषेण-काळातील लेण्यांशी बरोबरीचे ठरवता येत नाही. स्पष्टपणे, वेरूळ अजिंठा येथील कला आणि स्थापत्य वारशाचे धागे उचलतो आणि ते पुढील स्तरावर घेऊन जातो; ते समकालीन नाहीत, कारण वेरूळचे काहीही अजंठा येथे अद्याप दृश्यमान नाही. स्पष्टपणे, अजिंठा आणि वाकाटकांच्या पतनानंतर वेरूळची सुरुवात झाली. केवळ कला, स्थापत्य आणि प्रतिमाशास्त्रीय आधारच असा निष्कर्ष काढत नाहीत तर राजकीय आणि समाजशास्त्रीय भूगोल देखील हेच दर्शवितो. वेरूळवरील काही निरीक्षणे संदर्भात असू शकतात.
वेरूळचा पहिला बौद्ध काळ सहाव्या शतकाच्या मध्यापूर्वीचा आहे असे म्हणता येत नाही. इ.स. ४७७ मध्ये हरिषेणाच्या मृत्युनंतर अनेक दशके उलटून गेल्यानंतर तो कधीच सुरू झाला नसता . आपल्याला हरिषेणाचा फक्त एकच उत्तराधिकारी माहित आहे, त्याचा मुलगा सर्वसेन तिसरा, ज्याने फार काळ राज्य केले नाही (तक्ता १). त्याच्यानंतर, आपल्याला पश्चिमेकडील वाकाटकांबद्दल काहीही ऐकायला मिळत नाही. [७९] सर्वसेन तिसरा यांचा समकालीन, पूर्वेकडील वाकाटक राज्याचा पृथ्वीसेन दुसरा यांच्या बाबतीतही असेच आहे. पाचव्या शतकाच्या अखेरीस ते राज्य विस्मृतीत गेले. अनेक प्रादेशिक शक्ती वाकाटक राज्यांवर नियंत्रण मिळवतात. सहाव्या शतकात महिष्मतीच्या सुरुवातीच्या कालचुर्यांनी वेरूळ प्रदेशावर नियंत्रण मिळवले. वेरूळमध्ये सुरुवातीच्या कालचुर्यांनी काय भूमिका बजावली हे स्पष्ट नाही. आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठी कोणताही शिलालेख नाही. प्रदेशाचा ताबा घेतल्यानंतर लगेचच त्यांनी वेरूळच्या बौद्ध लेण्यांना प्रायोजित करण्यास सुरुवात केली अशी अपेक्षा करणे अवाजवी ठरेल. जर हरिषेणाच्या राज्याच्या पतनाचे मोठे कारण ब्राह्मणवादी आंदोलन आणि समाजशास्त्रीय उलथापालथ असेल - हा मुद्दा इतरत्र चर्चा केलेला आहे [80] - तर लहान तात्काळ उत्तराधिकारी हरिषेणाने केलेल्या पाखंडी मताचे पालन करतील अशी अपेक्षा कोणीही करू शकत नाही . सुरुवातीच्या कालचुर्यांनी जे केले ते ब्राह्मणवादी संरक्षणाचे समर्थन करणे होते. स्पिंकचा असा विश्वास आहे की मुंबई प्रदेशातील एलिफंटा आणि जोगेश्वरी सारख्या दगडात कोरलेल्या गुहा या काळात (सा.यु. सहाव्या शतकाच्या मध्यात) उत्खनन करण्यात आल्या. याव्यतिरिक्त, काही ब्राह्मणवादी लेण्या देखील वेरूळ येथे सुरू झाल्या होत्या ज्या घृषेणेश्वर ज्योतिर्लिंगामुळे आधीच तीर्थ होत्या . पहिली गुहा मंदिरे धबधब्याच्या जवळील २७ ते १७ गुहांमधील होती, सर्व ब्राह्मणवादी. [81]
त्यांच्या राजवटीच्या जवळजवळ अर्धशतकाच्या शेवटी, सुरुवातीच्या कालचुरींची जागा बदामीच्या सुरुवातीच्या चालुक्यांनी घेतली. या राजवंशाने आधीच बदामीच्या दगडी कोरीव लेण्यांना आश्रय दिला होता असे ज्ञात आहे. ऐतिहासिकदृष्ट्या, वेरूळच्या अनेक लेण्यांनी सुरुवातीच्या कालुक्य कला आणि स्थापत्यकलेशी शैलीत्मक आणि प्रतिकात्मक संबंध उत्तम प्रकारे प्रदर्शित केले आहेत. अशा प्रकारे, हे अधिक वाजवी दिसते की सुरुवातीच्या चालुक्यांनी वेरूळच्या बौद्ध लेण्यांच्या मालिकेचे उद्घाटन केले. [82]
हरिषेणाच्या अधिपत्याखालील अनेक दगडी कोरीव मठांमध्ये (आणि कदाचित लाकूड किंवा विटांच्या नाशवंत माध्यमांमध्ये) नवीन किंवा नूतनीकरण केलेल्या संरक्षक क्रियाकलाप त्याच्या सिंहासनावर आल्यानंतर लगेचच घडले. सध्याच्या संशोधनावर आधारित ही वस्तुस्थिती आपल्याला परिस्थितीचे मूल्यांकन करण्यास उद्युक्त करते. हे कसे घडले यावर प्रकाश टाकण्यासाठी आवश्यक पुरावे नसताना तर्क आणि अनुमान हेच एकमेव पर्याय आहेत. जवळजवळ तीन शतकांचा दीर्घकाळचा 'विराम' हरिषेणाच्या राज्याभिषेकाच्या काही काळापूर्वीच कसा खंडित झाला? हरिषेणाची धोरणे कोणाला कशी कळली असती, जर ती स्वतः हरिषेणाने जाहीर केली नसती तर? नवीन मठांच्या स्थापनेसाठी किंवा अजिंठा या जुन्या मठाच्या पुनर्जागरणाचे नियोजन करण्यासाठी इतके संरक्षक एकत्र कसे आले? समाज आणि प्रशासनाच्या वेगवेगळ्या क्षेत्रातून आलेले आश्रयदाते, काही राजदरबारातील, तर काही मंत्र्यांशी, राजांशी आणि श्रीमंत व्यापाऱ्यांशी मैत्री असलेले महायाजक होते तेव्हा आश्रयदात्यांमध्ये संवाद कसा होत असे? तुम्हाला माहिती आहेच की, सर्व आश्रयदाते भिक्षू नव्हते, किमान बुद्धभद्रइतके श्रीमंत किंवा साधनसंपन्न भिक्षू नव्हते. खरं तर, बहुतेक देणगीदार भिक्षू नसलेल्या समुदायाचे होते. बौद्ध जगात दोन व्यापक विभाग होते. एक, भिक्षूंचा आणि दुसरा सामान्य लोकांचा. सामान्य लोक मोठ्या संख्येने आश्रयदाते होते; हे हरिषेण काळातही खरे होते.
काही मोठ्या किंवा लहान संघांचे विविध प्रतिनिधी किंवा अनुयायी , जे प्रामुख्याने मूलसर्वास्तिवाद निकालाचे होते, त्यांच्या एकत्र येण्याने अजिंठा येथील संघरामाची ताकद किंवा नूतनीकरण वाढले असते . महाराजा हरिषेण यांच्या उघड किंवा गुप्त पाठिंब्याशिवाय हे घडू शकले नसते. भिक्षू एका मठातून दुसऱ्या मठात प्रवास करत असत ज्यामुळे कल्पनांची वाहतूक होऊ शकत असे. अशा शक्यतांना अजिंठा येथील कला, वास्तुकला आणि प्रतिमाशास्त्राच्या विविध वाक्प्रचार आणि शैलींद्वारे पुष्टी मिळते. इतर ठिकाणी चित्रकला टिकून राहिलेली नाही. म्हणून आवश्यक तुलना करता येत नाही. परंतु अजिंठा येथील कल्पना विविध प्रदेशांमधून आल्या आहेत हे दाखवण्यासाठी पुरेसा पुरातत्वीय, शिल्पकला, स्थापत्य, शिलालेख आणि प्रतिमाशास्त्रीय साहित्य आहे. उत्खनन वर्षानुवर्षे पुढे जात असताना तांत्रिक कौशल्य विकसित होण्यास वेळ लागला. सुरुवातीच्या काळात काम परिपूर्ण नव्हते हे दाखवणारी असंख्य उदाहरणे आहेत. काही गंभीर चुका देखील झाल्या. ज्येष्ठ आणि तज्ज्ञ भिक्षूंना कला आणि स्थापत्यशास्त्राच्या तत्त्वांमध्ये आणि पद्धतींमध्ये पारंगतता आली असती, परंतु बहुतेक कामगारांमध्ये असे लोक होते जे अनुभवी नव्हते; असेही काही लोक असतील ज्यांनी यापूर्वी कधीही खडक खोदला नव्हता. याचे मुख्य कारण म्हणजे मागील दशकांमध्ये किंवा शतकांमध्ये आपल्याला मोठ्या प्रमाणात दगडी उत्खनन आढळत नाही. काम कसे आयोजित केले गेले याबद्दल, रोमिला थापर यांनी सुमारे २०० ईसापूर्व - इ.स. ३०० मध्ये काढलेले चित्र हरिषेण काळातील अजिंठा येथील उदाहरणासाठी देखील योग्य ठरू शकते:
या काळात [सुमारे २०० ईसापूर्व - ३०० ईसापूर्व] बहुतेक क्रियाकलापांच्या पार्श्वभूमीवर बौद्ध धर्म होता, ज्याला श्रीमंत आणि शक्तिशाली लोकांचाही पाठिंबा होता. मिलिंदपन्हा , महावस्तु आणि सद्धर्म-पुंडरिका यांसारखे बौद्ध ग्रंथ व्यापारी समुदायाने निर्माण केलेल्या नीतिमत्तेचे समर्थन करत होते. म्हणूनच, मठ समृद्ध होते, मोठे स्तूप बांधले जात होते किंवा लहान स्तूपांचे नूतनीकरण केले जात होते आणि बौद्ध संघ श्रीमंत आणि आदरणीय बनला हे आश्चर्यकारक नाही. काही मठांमध्ये मोठ्या प्रमाणात देणग्या होत्या, गुलाम आणि मजूर जमिनीवर काम करण्यासाठी आणि इतर उद्योगांवर काम करण्यासाठी नियुक्त केले जात होते. या संरचनांचे डोंगराळ भागात उत्खनन करणे किंवा स्वतंत्रपणे उभे राहणाऱ्या इमारती बांधण्यासाठी भिक्षूंना विविध प्रकारच्या व्यवस्थापन कौशल्यांमध्ये, देणग्या गोळा करणे, तांत्रिक कौशल्य मोजणे, कामगारांवर नियंत्रण ठेवणे, हिशेब ठेवणे, बांधकाम देखरेख करणे, कमीत कमी सांगायचे तर, प्रवीण असणे आवश्यक होते. काहींना हे काम करण्यासाठी विशेष पदनाम देण्यात आले होते, परंतु बहुतेक, अप्रशिक्षित असल्याने, फक्त श्रमांचे पर्यवेक्षण करायचे. त्यांना या व्यवसायातील सामान्य अनुयायांनी नक्कीच मदत केली असती. जेव्हा बौद्ध भिक्षू पूर्णपणे सकाळी गोळा केलेल्या भिक्षेवर जगायचे ते दिवस मोठ्या आणि श्रीमंत मठांमधील मठांच्या रेफेक्टरीजमध्ये नियमित जेवण करणाऱ्यांसाठी एक दूरची आठवण बनले. [(थापर २००३, २७०)]
जसे आपण लक्षात घेतले आहे की, हरिषेण काळातील अजिंठा हे त्या काळातील प्रसिद्ध लोक जसे की महापुरूष, श्रीमंत व्यापारी, राजे, मंत्री आणि महाराज हरिषेण यांचे सचिव (' सचिव ') यांनी समक्रमितपणे आयोजित केले होते. आपल्याला ज्ञात असलेले सर्वात उत्कृष्ट भिक्षू म्हणजे भिक्षू बुद्धभद्र होते ज्यांच्याकडे इतका पैसा आणि राजकीय प्रभाव होता की त्यांनी अभूतपूर्व अशा अनेक महत्त्वाकांक्षी इमारती दान केल्या. त्यांच्या श्रेयाचे श्रेय आपण गुहा २१, २३, २४, २५ आणि २७ (आकृती ७) चे देतो. भिक्षू बुद्धभद्र यांनी गुहा २६ च्या ओसरीच्या भिंतीवर एक दान शिलालेख सोडला आहे. शेजारच्या गुहांमध्ये असे कोणतेही समर्पित शिलालेख आढळत नाहीत. लेण्यांच्या क्रमिक विकासाचा आणि संरचनात्मक परस्परसंबंधांचा स्पिंकचा सविस्तर अभ्यास (डब्ल्यूएम स्पिंक २००७) दर्शवितो की शेजारच्या लेण्या (गुहा २२ वगळता) त्याच आश्रयदात्याने आश्रयदाता म्हणून वापरल्या होत्या ज्याने गुहा २६ ला आश्रय दिला होता. म्हणूनच, भिक्षू बुद्धभद्र यांनी केवळ गुहा २६च नव्हे तर लगतच्या गुहा २१, २३, २४, २५, २७ आणि कदाचित कड्याच्या सर्वात पश्चिम टोकावरील अत्यंत अपूर्ण गुहा २८ ला देखील आश्रयदाता म्हणून वापरल्या. त्यांच्या देणगीदार शिलालेखाचे काळजीपूर्वक वाचन केल्याने असे दिसून येते की ते कदाचित अश्मक देशात असलेल्या संघरामाचे मुख्य पुजारी असावेत . बर्गेस यांनी प्रथम हा मुद्दा काढला होता:
बुद्धभद्र हे सामान्य भिक्षू नव्हते असे दिसते (वचन ७)... ' अभिजानोपन्न ' (वचन १६) हे उपाधी, ज्याचा अर्थ असा होतो की ते कुलीन कुटुंबातील होते, ते देखील सूचित करते की ते केवळ एक सामान्य भिक्षू होते. कदाचित, जर आपण असे गृहीत धरले की ते जैन श्रीपूजकांच्या पदासारखे होते आणि काही बौद्ध पंथाचे आध्यात्मिक प्रमुख होते, तर आपण चूक करणार नाही. त्यांनी 'लोकांच्या कल्याणासाठी प्रयत्नशील' (वचन १६) आणि 'लोकांची काळजी स्वतःवर घेतली' असा उल्लेख केला आहे, ही वस्तुस्थिती या मताच्या समर्थनार्थ जोडली जाऊ शकते. [(बर्गेस १८८३, १३३)]
भिक्षू बुद्धभद्र यांचे अश्मक देशाशी एक गूढ पण भौतिकदृष्ट्या शक्तिशाली संबंध होते. अश्मकराजाचे मंत्री भवविराज यांच्याशी त्यांची मैत्री अनेक पूर्वीच्या अस्तित्वांपासून चालू होती, जसे आपल्याला गुहा २६, श्लोक ९-१० मधील त्यांच्या दान शिलालेखात सांगितले आहे:
भिक्षू बुद्धभद्र यांनी सुगताचे हे मंदिर त्यांच्या पालकांच्या सन्मानार्थ तसेच अश्माकाच्या पराक्रमी राजाची सेवक म्हणून सेवा करणाऱ्या भवविराजाच्या सन्मानार्थ बांधले आहे, जो सलग अनेक जन्मांपासून त्याच्याशी (भिक्षूशी) मैत्रीने जोडलेला होता...' [ (यजदानी १९५२, ११८)]
बुद्धभद्र कदाचित बौद्ध निकायांपैकी एकाचे प्रादेशिक प्रमुखही असावेत . ते बहुश्रुतीय होते [83] की मूलसर्वास्तिवादीन? रंगवलेल्या भित्तीचित्रांच्या थीम ओळखण्याच्या प्रयत्नांवरील अलीकडील अद्यतनांवरून असे दिसून येते की अजिंठा येथील बहुतेक रंगवलेल्या थीम मूलसर्वास्तिवाद विनयाच्या विद्यमान स्त्रोतांशी जवळून संबंधित आहेत. [84] पाचव्या शतकातील चित्रांवर, श्लिंगलॉफ लिहितात:
बहुतेक कथात्मक चित्रे मूलसर्वास्तिवादिन [85] च्या विनयावर, आर्यशुर [86] आणि अश्वघोष [87] च्या कवितांवर आधारित आहेत . चित्रांशी संबंधित सर्व साहित्यकृती हीनयानशी संबंधित आहेत आणि त्यानुसार, आणि त्यानुसार, विशेषतः महायानी विषयांचे चित्रण केले गेले नाही, अवलोकितेश्वर भक्ती चित्रांचा अपवाद वगळता (श्लिंगलॉफ 1987, 175-80). नंतरच्या लेण्यांसाठी 'महायान-लेणी' हा शब्द, जो चित्रांची साहित्यिक पार्श्वभूमी अद्याप अज्ञात होती त्या काळापासून उद्भवला आहे, म्हणून केवळ लेबल म्हणून वापरला जाऊ शकतो; या संज्ञेच्या आधारे चित्रांमागील विचारसरणीबद्दल निष्कर्ष काढणे चूक होईल. [(श्लिंगलॉफ, अजंता: हँडबुक ऑफ द पेंटिंग्ज 2013, खंड I, 75)]
तथापि, गुहा २२ च्या सप्तमानुषीबुद्ध भित्तिचित्रात, एका रंगीत शिलालेखात असे नोंदवले आहे की देणगीदार एकतर अपारशैल किंवा महायानाचा अनुयायी होता. कोहेनची आवृत्ती ' सफलता! हे शाक्यभिक्षु अपारशैलचे धार्मिक दान आहे...' [88] (२००६, ३३१) आहे. टीप ३ मध्ये, संपादक निरीक्षण करतात, 'कदाचित, ते शाक्यभिक्षो म अपारशैलनिकायस्य असे लिहिले असेल.' [89] तथापि, एन.पी. चक्रवर्ती यांच्या आवृत्तीत शेवटचा अर्धशतक 'यश! हे महान वाहनाचे अनुयायी शाक्य भिक्षूची गुणवान देणगी आहे...' असा होता [90] (१९५२, ११२) . दोन्ही आवृत्त्यांपैकी, कोहेनच्या सुचवलेल्या वाचनात कदाचित गुरुकिल्ली आहे. परंतु, गुहा १० च्या आतील भागात असलेल्या एका शिलालेखावरून त्या ठिकाणी आणखी एक निकाल असल्याचे सूचित होते , तो म्हणजे चेतिकाचा: ' विपश्विन, पूर्ण आणि परिपूर्ण बुद्ध. चेतिक रिकाशी संबंधित' [91] (कोहेन २००६, ३०४). कोहेन उपसंयुक्त नोट्समध्ये तपशीलवार सांगतात :
या नोंदीमध्ये चेतिका या शब्दाचा समावेश हा सध्याचा देणगीदार महासांघिकाच्या उप-पंथ असलेल्या चेतिका निकालाचा सदस्य होता हे दर्शविणारा एक संकेत म्हणून मोठ्या प्रमाणात वाचला जातो . वसुमित्राच्या मते, या पंथाचे नाव या वस्तुस्थितीवरून आले आहे की त्याचे संस्थापक अमरावतीजवळील कैत्य-टेकडीवर राहत होते आणि पंथाच्या सैद्धांतिक भूमिकेबद्दल काहीही सूचित करत नाही (जिर्यो मासुदो. “ओरिजिन अँड डॉक्ट्रिन्स ऑफ अर्ली बुद्धिस्ट स्कूल्स: अ ट्रान्सलेशन ऑफ द ह्सुआन-च्वांग व्हर्जन ऑफ वसुमित्राच्या ग्रंथ,” एशिया मेजर . २ [१९२५]: १५). खरं तर, वसुमित्र असे नमूद करतात की चेतिका निकालाच्या वैशिष्ट्यपूर्ण सिद्धांतांपैकी एक म्हणजे, “जरी कोणी स्तूपाला अर्पण केले तरी त्याला उत्तम फळे मिळत नाहीत” (मसुद: ३८). हे शिलालेख चेतिक निकालाचा संदर्भ घेते असे गृहीत धरले तर , हे लक्षात घेण्यासारखे आहे की अजंठा येथे उल्लेख केलेला एकमेव दुसरा निकाल , शिलालेख क्रमांक ९० मधील अपरशैल, हा देखील महासांघिकाचा एक उप-पंथ होता, जो मूळचा अमरावती प्रदेशातील होता. [ (कोहेन २००६, ३०४)]
वरीलवरून असा निष्कर्ष काढता येत नाही की अजिंठाचे मुख्य संरक्षक विविध निकालांमधून आले होते , कारण वर उल्लेख केलेल्या शिलालेखांचा काळ चुकवू नये. दोन्ही घटनांमध्ये, भित्तीचित्रे आणि शिलालेख विघटनाच्या काळातील आहेत, सुमारे ४७८-४८० CE. हा काळ होता जेव्हा मूळ संरक्षकांनी हे ठिकाण सोडून दिले होते आणि अनेक सामान्य भिक्षू आणि उपासकांनी रिकाम्या जागांचा वापर काही रंगवलेले आणि कोरीव बुद्ध आणि स्तूप दान करण्यासाठी केला होता. हे सोडून दिलेल्या लेण्यांच्या रिकाम्या आणि प्रमुख ठिकाणी ठेवण्यात आले होते. स्पिंक त्यांना 'अनाहूत' प्रतिमा म्हणतात कारण त्या मूळ मांडणी आणि योजनेत घुसखोरी करतात आणि त्यांचे उल्लंघन करतात. [92] अशा प्रकारे, दोन्ही घटनांमध्ये, नवीन देणगीदार होते - जे इमारतींचे मालक किंवा मूळ संरक्षक नव्हते - जे महायान किंवा अपरशैल आणि चेतिका निकालांचे होते . अशाप्रकारे, वरील पुरावे देखील आपल्याला मूळ संरक्षक कोणत्या शाळांचे आहेत हे शोधण्यास मदत करत नाहीत. जेव्हा शिलालेख आणि प्रश्नातील भित्तीचित्रे मदत करत नाहीत, तेव्हा आपण श्लिंगलॉफ (२०१३) आणि झिन (२००३) यांनी उघड केलेल्या स्त्रोतांवर फायदेशीरपणे अवलंबून राहू शकतो. रंगवलेल्या थीम्सच्या अचूक ओळखीवरील त्यांच्या संशोधनातून स्पष्टपणे दिसून येते की बहुतेक आयकॉनोग्राफिक स्रोत मूलसर्वास्तिवाद विनयातून घेतले गेले होते.
स्पिंक यांनी असा प्रस्ताव मांडला आहे की अजिंठाच्या नंतरच्या काळाचा इतिहास आणि वाकाटकांचा, विशेषतः हरिषेणाचा, अविभाज्यपणे जोडलेला आहे. हरिषेणाच्या मृत्यूने मठाचा मृत्यू झाला. पाचव्या शतकाचा शेवटचा तिमाही वाकाटकांच्या दोन्ही शाखांसाठी तसेच अजिंठासाठी घातक ठरला. केवळ अजिंठासाठीच नाही तर इतर बौद्ध मठांसाठी देखील जिथे संरक्षणात्मक क्रियाकलाप चालू होते. पूर्व आणि पश्चिम दोन्ही वाकाटक एकत्र कसे कोसळले? सहाव्या शतकाच्या सुरुवातीपासून कदंब, प्रारंभिक कालचुरी, विष्णुकुंडीन, नल, मुंडपुत्र आणि कुंभकर्ण या सलग शासकांच्या नियंत्रणात वाकाटकांचे अधिपत्य दिसून येते. [93] त्यांना नष्ट करण्याचे कोणते घटक होते? यात काही स्पष्टता नाही. अजिंठा, बानोटी, बाग, औरंगाबाद आणि घटोटकच येथे जतन केलेले पुरातत्वीय, कला ऐतिहासिक आणि शिलालेखीय पुरावे गूढतेत भर घालतात जे एकत्रितपणे सूचित करतात की हरिषेणाच्या अधिपत्याखालील वेगवेगळ्या प्रांतांमध्ये असलेल्या या सर्व मठांमधील विकास अचानक संपला. कामाच्या घाईघाईने आणि तात्काळ सोडून देण्याचे जागेवरील पुरावे निर्विवाद आहेत परंतु इतके तपशीलवार आहेत की त्यांचे दस्तऐवजीकरण करण्यासाठी अनेक खंडांची आवश्यकता असेल. [94] ते सातत्याने सूचित करतात की मूळ संरक्षकांनी केलेले काम अनपेक्षितपणे आणि वेगाने बंद झाले होते. काही ठिकाणी, कामे रात्रभर सोडून देण्यात आली आहेत असे दिसते, जे कधीही पुन्हा सुरू करता आले नाही. असे संकेत आहेत की एखाद्या विशिष्ट तारखेला अचानक आपत्ती आली होती. स्पिंकने वर्षाचा अंदाज इ.स. ४७७ (स्पिंक आणि यागुची २०१४, आकृती xii) असा दिला आहे . स्पिंक म्हणतात की ही तारीख परिपूर्ण नाही परंतु बहुतेक लेण्यांच्या समकालिक आणि अधूनमधून विकास समजून घेण्यासाठी आणि स्पष्ट करण्यासाठी पुनर्बांधणी केली आहे. तो मान्य करतो की अजिंठा विकासाचा प्रस्तावित कालखंड पुढील संशोधनाच्या आधारे काही वर्षे पुढे किंवा मागे हलवता येईल. साइटवरील पुराव्यांचे तपशीलवार परीक्षण केल्यास असे दिसून येईल की स्पिंकचे सूत्रीकरण बरेच अनुमानात्मक आहे. हे देखील स्पष्ट होईल की अनुमानित किंवा अंदाजे तारीख निश्चित करणे उत्खनन आणि चित्रकला क्रियाकलापांच्या कालक्रमानुसार क्रम समजून घेण्यास मदत करते. अजिंठा औरंगाबाद, बानोटी, घटोटकचा, बाग आणि कान्हेरीशी कसा जवळचा संबंध आहे आणि काही कल्पना सांची, सारनाथ, कान्हेरी, नाशिक, मथुरा, नालंदा आणि उत्तर भारत, पाकिस्तान, अफगाणिस्तान आणि मध्य आशियातील इतर मोठ्या मठ संस्थांमधून कशा आल्या हे जाणून घेण्यास मदत करते.
हरिषेण काळातील पाच मठांचा अनपेक्षित आणि एकाच वेळी त्याग हे स्पष्टीकरण देण्यास पात्र आहे. हे मठ वेगवेगळ्या भौगोलिक ठिकाणी पसरलेले असल्याने, सर्व हरिषेणाच्या राज्यात असल्याने, त्यागाचे श्रेय एका मोठ्या आणि सामान्य घटकाला द्यावे लागेल; असे दिसते की अचानक हरिषेणाच्या राज्यावर आपत्ती किंवा आपत्ती आली होती. त्याहूनही भयानक म्हणजे; पूर्वेकडील वाकाटकांच्या राज्यालाही या परिस्थितीने ग्रासले आहे असे दिसते, कारण पाचव्या शतकाच्या अखेरीस त्यांचाही ऱ्हास तितक्याच वेगाने झाला. म्हणून, हा घटक एका विशिष्ट संरक्षकाच्या इमारतीपेक्षा मोठा होता; तो एका विशिष्ट मठ स्थापनेपेक्षा मोठा होता; तो ऋषिक किंवा अश्मकच्या राज्यापेक्षा मोठा होता; तो हरिषेणाच्या राज्यापेक्षाही मोठा होता. काही दशकांतच, संपूर्ण वाकाटक राजवंशावर पडदा पडला असे दिसते. तो घटक काय होता? याचे उत्तर समाजशास्त्राशी संबंधित असू शकते. परंतु, दंडीनच्या दशकुमारचरिताच्या आठव्या अध्यायातील काही मजकुरांवरून तसेच इतर संबंधित निर्देशांवरून, स्पिंक असा युक्तिवाद करतात की वाकाटकांचा पतन हा अश्मकांचा हात होता ज्यांनी काही असंतुष्ट राजांचा संघ निर्माण केला होता आणि साम्राज्य बळकावण्याचा प्रयत्न केला होता. स्पिंकचा पहिला खंड पूर्णपणे या थीमवर समर्पित आहे (डब्ल्यूएम स्पिंक २००५). त्यांच्या सिद्धांतात, हे केवळ राजकीय क्षेत्र आहे जिथे अशांतता आणि बंडाचे नाट्य रंगवले जाते. तर सध्याच्या लेखकाच्या मते ते प्रामुख्याने समाजशास्त्रीय क्षेत्र आहे जिथे संभाव्य वांशिक संघर्षाचे नाट्य रंगवले जाते ज्यामुळे राजकीय अस्थिरता आणि अराजकता निर्माण होते.
मग आपण विचारू का: काही समाजशास्त्रीय गोंधळ झाला होता का? अजिंठा आणि घटोत्कच शिलालेखांमध्ये हरिषेणाची स्तुती करण्यात आली आहे, [95] हे स्पष्ट आहे की तो बौद्धांना पाठिंबा देत होता. [96] कदाचित त्याच कारणासाठी त्याची हत्या झाली असेल का? व्यापक सामाजिक उलथापालथीमुळे बौद्धांना हाकलून लावण्यात आले होते का? भविष्यातील संशोधनच या प्रश्नांची उत्तरे देऊ शकेल.
शास्त्री (१९९७, २१२) |
बेकर (१९९७, १६९-७१) |
स्पिंक (२००५, १६६) |
|
अविभाजित राजवंश |
|||
विंध्यशक्ती १ |
२५०-२७५ इ.स. |
- |
- |
प्रवीरा उर्फ प्रवरसेन पहिला |
२७५-३३५ इ.स. |
२७५-३३५ इ.स. |
- |
नंदीवर्धन शाखा |
|||
गौतमीपुत्र पहिला |
- |
- |
- |
रुद्रसेन पहिला |
३३५-३५५ इ.स. |
३३५-३६० इ.स. |
- |
पृथ्वीसेना पहिला |
३५५-३८५ इ.स. |
३६०-३९५ इ.स. |
- |
रुद्रसेन दुसरा |
३८५-३९५ इ.स. |
३९५-४०५ इ.स. |
३८५-३९०, वर्ष ५ च्या वाढीस परवानगी देते. |
कार्यवाहक सम्राट प्रभावतीगुप्त |
४०५-४१९ इ.स. |
३९०-४०५, अंदाजे १५ वर्षांचा रीजन्सी |
|
युवराज दिवाकरसेन |
३९५-४१० इ.स. |
- |
|
दामोदरसेन |
४१०-४२० इ.स. |
४१९-४२२ इ.स. |
४०५-४१०, कारण भावाचे राज्य दीर्घ होते |
प्रवरसेन दुसरा |
४२०-४५५ इ.स. |
४२२-४५७ इ.स. |
४१०-४४५, वर्ष ३२ साठी परवानगी देते. |
नरेंद्रसेना |
४५५-४८० इ.स. |
४५७-४६१ इ.स. |
४४५-४५५, लांबीचा कोणताही पुरावा नाही. |
पृथ्वीसेन दुसरा |
४८०-५००/५०५ इ.स. |
४७५-४७७ इ.स., वत्सगुल्माच्या अधीनस्थ |
४५५-४७५, वर्ष १७ च्या वाढीस परवानगी देते. |
४७८-४९५, स्वतंत्र |
|||
वत्सगुल्मा शाखा |
|||
सर्वसेन पहिला |
३२५-३५५ इ.स. |
- |
- |
विंध्यशक्ती दुसरा उर्फ विंध्यसेन |
३५५-४०० इ.स. |
३६०-४०० इ.स. |
- |
प्रवरसेन दुसरा |
४००-४२५ इ.स. |
400-450 CE, नंदीवर्धनाच्या अधीनस्थ |
- |
सर्वसेन दुसरा |
४२५-४५५ इ.स. |
- |
|
देवसेना |
४५५-४८० इ.स. |
४५०-४६० इ.स. |
- |
हरिसेना |
४८०-५१० इ.स. |
४६०-४७८ इ.स. |
४६०-४७७, देवसेना ४५८ वर राज्य करत आहे. |
सर्वसेन तिसरा |
- |
- |
४७८-४८३, ४८६ पूर्वी मृत्यू झाला |
संकलन: आर.के. सिंग. तारखा अंदाजे आहेत.
आकृती १ 'वाकाटक स्थळांचा नकाशा' (स्पिंक आणि यागुची २०१४, xv) आणि (वेनर १९७७, ११) वरून
आकृती २ 'वाकाटक शिलालेख आणि नाण्यांचे वितरण' (शास्त्री १९९७, नकाशा) वरून
आकृती ३ 'गुप्त आणि वाकाटकांच्या काळातील भारत', (डब्ल्यूएम स्पिंक २००९, आकृती १), (श्वार्ट्झबर्ग १९९२, प्लेट III.D.1) वरून रूपांतरित.
आकृती ४ अजिंठा: गुहा १८, समोरचे दृश्य
आकृती 5 अजिंठा: श्रावकायन लेणी
आकृती ६ अजिंठा: लेणी १७-२०
आकृती ७ अजिंठा: गुहा २६-संकुल
आकृती ८ अजिंठा: गुहा २६अ ( गुहा २६ च्या खाली ), २०१२ मध्ये पुन्हा शोधला गेला.
आकृती ९ अजिंठा: गुहा २६-कॉम्प्लेक्स, इ.स. ४८० मध्ये , काल्पनिक ३D मॉडेल, तपशील वगळून, (सिंग २०१२अ, ६१) वरून.
आकृती १० गुहा वरच्या ६ ( वर ) आणि खालच्या ६ ( खाली ), (बर्गेस १८८०, प्लेट XXXII) पासून
आकृती ११ गुहा २६-कॉम्प्लेक्स (आयसोमेट्रिक प्लॅन): स्पिंक आणि अजित राव यांचे काल्पनिक पुनर्बांधणी (अजित राव आणि नितीन वेतुरकर यांचे कलाकृती; वॉल्टर एम. स्पिंक आणि संस्कार यांच्या सौजन्याने)
भारतीय पुरातत्व सर्वेक्षण. २०११. "जागतिक वारसा स्थळे - अजिंठा लेणी." भारतीय पुरातत्व सर्वेक्षण. ९ नोव्हेंबर २०१५ रोजी पाहिले. http://asi.nic.in/asi_monu_whs_ajanta.asp.
बेकर, हंस टी., एड. 2004. वाकाटक हेरिटेज: क्रॉसरोड्सवर भारतीय संस्कृती. ग्रोनिंगेन: एग्बर्ट फोर्स्टन.
—. 1997. द वाकाटक: हिंदू आयकॉनॉलॉजीमधील निबंध. ग्रोनिंगेन: एग्बर्ट फोर्स्टन.
ब्रोंखोर्स्ट, जोहान्स. २००७. ग्रेटर मगध: स्टडीज इन द कल्चर ऑफ अर्ली इंडिया, एचडीओ सिरीज. लीडेन आणि बोस्टन: ब्रिल.
बर्गेस, जेम्स. १८८३. बौद्ध गुहा मंदिरे आणि त्यांचे शिलालेख, पश्चिम भारताचे पुरातत्व सर्वेक्षण मालिका. खंड ४. लंडन: ट्रबनर अँड कंपनी.
बर्गेस, जेम्स. १८८०. "वेस्टर्न इंडियाची गुहा मंदिरे." द केव्ह टेम्पल्स ऑफ इंडिया मध्ये , जेम्स फर्ग्युसन आणि जेम्स बर्गेस, १६५-५२४ द्वारे. लंडन: डब्ल्यूएच ऍलन.
बर्गेस, जेम्स आणि पंडित भगवानलाल इंद्रजी. १८८१. पश्चिम भारतातील गुहा मंदिरांमधील शिलालेख, पश्चिम भारतातील पुरातत्व सर्वेक्षण मालिका. मुंबई: सरकारी केंद्रीय प्रेस.
चक्रवर्ती, एनपी १९५२. द पेंटेड इन्स्क्रिप्शन्स. खंड ४, अजिंठा: मोनोक्रोम रिप्रोडक्शन्स ऑफ द अजंता फ्रेस्कोज बेस्ड ऑन फोटोग्राफी , जी. यजदानी, १११-११२. लंडन: ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटी प्रेस.
छाब्रा, बी. अध्याय १९५२. द इंकिसाइज्ड इन्स्क्रिप्शन्स. खंड ४, अजिंठा: मोनोक्रोम रिप्रोडक्शन्स ऑफ द अजंता फ्रेस्को बेस्ड ऑन फोटोग्राफी , संपादित गुलाम यजदानी, ११४-११८. लंडन: ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटी प्रेस.
कोहेन, रिचर्ड स्कॉट. २००६. परिशिष्ट: अजिंठाचे शिलालेख. खंड II, अजिंठा बद्दलच्या युक्तिवादांमध्ये: अजिंठा, इतिहास आणि विकास -- हँडबुक डेर ओरिएंटॅलिस्टिक (एचडीओ) मालिका , वॉल्टर एम. स्पिंक द्वारे, जे. ब्रोंखोर्स्ट द्वारे संपादित, २७३-३३९. लीडेन: ब्रिल.
कॉलिन्स, मार्क. १९०७. "रघुवंश आणि दशकुमारचरिताचा भौगोलिक डेटा." अप्रकाशित डॉक्टरेट प्रबंध, तत्वज्ञान संकाय, लाइपझिग विद्यापीठ, लाइपझिग.
डीकॅरोली, रॉबर्ट. १९९५. "दंडिनच्या दशकुमाराचरिताचे विश्लेषण आणि वाकाटक आणि पल्लव न्यायालयांसाठी त्याचे परिणाम." जर्नल ऑफ द अमेरिकन ओरिएंटल सोसायटी , ६७१-६७८.
देशपांडे, ब्रह्मानंद. 2002c. दशकुमारचरित आणि अजिंठा लेण्यांची तारीख. खंड. मी, ब्रह्मानंद देशपांडे लिखित एपिग्राफीच्या अभ्यासात , ८०-९१. औरंगाबाद : कैलास पब्लिकेशन्स.
—. १९९२. "वाकाटक अधोगतीच्या संदर्भात अजिंठा लेण्यांची तारीख." महाराष्ट्र पथिक , जुलै: ८-१४.
देशपांडे, ब्रह्मानंद. 2002 ब. खानदेशातील वाकाटक राजवट. खंड. मी, ब्रह्मानंद देशपांडे लिखित एपिग्राफीच्या अभ्यासात , ६५-७९. औरंगाबाद : कैलास पब्लिकेशन्स.
देशपांडे, ब्रह्मानंद. 2002a. वाकाटक-त्रैकुटक संबंध. खंड. मी, ब्रह्मानंद देशपांडे लिखित एपिग्राफीच्या अभ्यासात , 54-64. औरंगाबाद : कैलास पब्लिकेशन्स.
देशपांडे, ब्रह्मानंद. 1996. वाकाटक नृपती हरिसेना: एक पुनर्मुल्यांकना. खंड. II, शोधमुद्रा मध्ये , ब्रह्मानंद देशपांडे, 29-41. औरंगाबाद : कैलास पब्लिकेशन्स.
ढवळीकर, एमके १९८४. पश्चिम भारतातील लेट हीनयान लेणी. पूना: डेक्कन कॉलेज पोस्ट ग्रॅज्युएट अँड रिसर्च इन्स्टिट्यूट.
—. २००३. सांची, मोन्युमेंटल लेगेसी मालिका. नवी दिल्ली: ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटी प्रेस.
दत्त, एन., संपादन १९४७-५०. [मुलासर्वास्तिवाद-विनय] गिलगिट हस्तलिखिते, द काश्मीर सिरीज ऑफ टेक्स्ट्स अँड स्टडीज, ७१. संस्कृत आवृत्ती. खंड ३. खंड ४. श्रीनगर.
फर्ग्युसन, जेम्स आणि जेम्स बर्गेस. १८८०. भारतातील गुहा मंदिरे. लंडन: डब्ल्यूएच ऍलन.
घोष, ए. १९६७. अजिंठा भित्तीचित्रे: रंगीत पंच्याऐंशी पुनरुत्पादनांचा अल्बम. प्रतिपादन १९८७, २००४. ए. घोष यांनी संपादित केले. नवी दिल्ली: भारतीय पुरातत्व सर्वेक्षण.
ग्नोली, रानीरो, संपादन १९७७-७८. [मुलासर्वास्तिवाद-विनय] संघभेदावस्तुच्या गिलगिट हस्तलिखिते, मूलसर्वास्तिवादिनच्या विनयाचा १७ वा आणि शेवटचा भाग असल्याने, सेरी ओरिएंटेल ४९. दुसरा खंड. रोमा: आयएसआयएओ.
गोखले, शोभना. १९९२. "कान्हेरीवरून हरिषेणाच्या विजयावरील उपसंहारात्मक पुरावा." अजय मित्र शास्त्री, २६९-२७८ द्वारे लिहिलेले, द एज ऑफ द वाकाटकांमध्ये . नवी दिल्ली: हरमन पब्लिशिंग हाऊस.
गुगल इंक. २०१३. अक्षांश २०°३३'९.६२"उत्तर, रेखांश ७५°४२'०.६८"पूर्व. आवृत्ती ७.१.२.२०४१. ७ ऑक्टोबर. १३ नोव्हेंबर २०१५ रोजी पाहिले.
गोयल, शंकर. २०१२. "वाकाटक अर्थव्यवस्थेच्या सामंती स्वरूपाची चौकशी: एपिग्राफिक पुराव्याचा अभ्यास." अध्यक्षीय भाषण: एपिग्राफिकल सोसायटी ऑफ इंडियाची XXXVII वार्षिक काँग्रेस (२४-२६ फेब्रुवारी २०१२). बडोदा: एपिग्राफिकल सोसायटी ऑफ इंडिया आणि पुरातत्व आणि प्राचीन इतिहास विभाग, एमएस युनिव्हर्सिटी ऑफ बडोदा. १-३१.
इंद्रजी, पंडित भगवानलाल. १८८१. वर्णनात्मक नोट्ससह पश्चिम भारतातील गुहा-मंदिरांमधील शिलालेख, आणि. भारतीय भारताचे प्रतिपादन, दिल्ली, १९७६. मुंबई: पश्चिम भारतातील पुरातत्व सर्वेक्षण, सरकारी मध्यवर्ती प्रेसमध्ये छापलेले.
जामखेडकर, एपी २००९. अजिंठा: स्मारकीय वारसा मालिका. नवी दिल्ली: ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटी प्रेस.
—. १९९१. "अजिंठा येथील प्राध्यापक स्पिंकच्या कालक्रमानुसार काही विचार." महाराष्ट्र पथिक , एप्रिल.
जॉन्स्टन, ईएच, संपादन १९२८. द सौंदरानंद ऑफ अश्वघोष, पंजाब युनिव्हर्सिटी ओरिएंटल पब्लिकेशन्स मालिका. ईएच जॉन्स्टन यांनी अनुवादित. खंड चौदावा. लाहोर: द युनिव्हर्सिटी ऑफ द पंजाब. रिप्र. टोकियो १९७२, मोतीलाल बनारसीदास १९७५.
कन्नल, दीपक एच. १९९६. वेरूळ: शिल्पकलेच्या शैलीतील एक रहस्य. नवी दिल्ली: पुस्तके आणि पुस्तके.
केर्न, हेंड्रिक जे., संपादन १८९१. जातक-माला, हार्वर्ड ओरिएंटल मालिका. रिप्र. केंब्रिज, मास. १९१४. खंड १. बोस्टन: हार्वर्ड युनिव्हर्सिटी प्रेस.
खंडाळवाला, कार्ल. 1990. “अजिंठ्याच्या महायान लेण्यांचा इतिहास आणि डेटिंग.” महाराष्ट्र पथिक , सप्टेंबर: 18-21.
खंडाळवाला, कार्ल. 1991. अजिंठा येथील लेणी 16, 17, 19, 26, 1 आणि 2 आणि घटोत्कच लेणीचा कालक्रम. खंड. मी, द आर्ट ऑफ अजंता: न्यू पर्स्पेक्टिव्हज मध्ये , रतन परिमू, दीपक कन्नाल, शिवाजी पणिककर आणि जयराम पोडुवाल यांनी संपादित, 105-129. दिल्ली: पुस्तके आणि पुस्तके.
खोरोचे, पीटर, ट्रान्स. १९८९. एकदा बुद्ध एक वानर होते: आर्यसुराची जातकमला. शिकागो-लंडन: द युनिव्हर्सिटी ऑफ शिकागो प्रेस.
कुल्के, हरमन. २००४. "पूर्वेकडील वाकाटकांखाली राज्य आणि राज्य निर्मितीवरील काही विचार." हान्स टी. बेकर, १-९ द्वारे लिहिलेल्या द वाकाटक हेरिटेज: इंडियन कल्चर अॅट द क्रॉसरोड्स मध्ये . ग्रोनिंगेन: एग्बर्ट फोर्स्टेन.
मालंद्रा, गेरी एच. १९९३. मांडला उलगडणे: वेरूळ येथील बौद्ध गुहा मंदिरे. न्यू यॉर्क: स्टेट युनिव्हर्सिटी ऑफ न्यू यॉर्क.
मिराशी, VV 1960. दांडिनच्या दशकुमारचरितामधील ऐतिहासिक डेटा. खंड. मी, स्टडीज इन इंडॉलॉजी , व्ही. मिराशी यांनी संपादित, १६५-१७७. नागपूर : विदर्भ संशोधन मंडळ.
मिराशी, वि.वि., एड. 1963. वाकाटकांचे शिलालेख, कॉर्पस इंस्क्रिप्शनम इंडीकेरम सिरीज. खंड. व्ही. ओटाकमुंड: भारतासाठी सरकारी एपिग्राफिस्ट.
मित्रा, देबाला. १९९६. अजिंठा. ११ वा. नवी दिल्ली: भारतीय पुरातत्व सर्वेक्षण.
नागराजू, एस. 1981. एस. बुद्धिस्ट आर्किटेक्चर ऑफ वेस्टर्न इंडिया, सी. 250 बीसी - इ.स. AD 300. दिल्ली: आगम कला प्रकाशन.
निगम, एल एस. 2004. "छत्तीसगड (दक्षिणा कोसला) मधील वाकाटक कलेचा प्रभाव आणि विस्तार." इन द वाकाटक हेरिटेज: इंडियन कल्चर ॲट द क्रॉसरोड्स , हंस टी बाकर, 143-156. ग्रोनिंगेन: एग्बर्ट फोर्स्टन.
रेवेन, एलेन एम. २००४. “किंग्ज इन कॉपर.” द वाकाटाका हेरिटेज: इंडियन कल्चर अॅट द क्रॉसरोड्स मध्ये , हंस टी बेकर, १९-३१. ग्रोनिंगेन: एग्बर्ट फोर्स्टेन.
रुएग, डेव्हिड सेफोर्ट. २००४. "(पूर्वीच्या) भारतीय महायानाच्या तपासाचे पैलू." जर्नल ऑफ द इंटरनॅशनल असोसिएशन ऑफ बुद्धिस्ट स्टडीज XXVII (१): ३-६२.
Sahapedia.org. 2015. अजिंठा लेणी: डॉ. राजेश कुमार सिंग प्रा. नाओमिची यागुची यांच्याशी संभाषणात. व्हिडिओ. फणी दमारा यांनी संपादित केले. Sahapedia.org. पुणे, २५ सप्टेंबर. आगामी.
शिफनर, अँटोन. १८७६-१८७८. "[मुलसर्वस्वाद-विनया] इंडिशे एर्झाहलुंगेन." बुलेटिन डी l'Académie impériale des Sciences de St.-Pétersbourg. खंड. XXI-XXIV. XXI: 433-93; XXII: 123-38; XXIII: 1-70, 529-65; XXIV: 449-508. प्रतिनिधी Übersetzungen aus dem tibetischen Kanjur, Sinologica Coloniensia series, XXV, Otto Harrassowitz Verlag, Weisbaden, 2007.
—. १८८२. [मुलासर्वास्तिवाद-विनय] भारतीय स्त्रोतांमधून घेतलेल्या तिबेटी कथा, ए. शिफनर यांच्या कहग्युरच्या, ट्रुबनरच्या ओरिएंटल मालिकेतील. डब्ल्यू. रॅल्स्टन यांनी अनुवादित. बोस्टन: जेम्स आर. ओसगुड अँड कंपनी रिप्र. १९२५, १९९०.
श्लिंगलोफ, डायटर. २०१३. अजिंठा: हँडबुक ऑफ द पेंटिंग्ज. तिसरा खंड. नवी दिल्ली: आयजीएनसीए आणि आर्यन बुक्स इंटरनॅशनल.
—. १९८७. अजिंठा चित्रांमधील अभ्यास: ओळख आणि व्याख्या. दिल्ली: अजिंठा प्रकाशने.
श्वार्ट्झबर्ग, जोसेफ ई., संपादन १९९२. दक्षिण आशियाचा ऐतिहासिक नकाशा. दुसरा. ऑक्सफर्ड: ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटी प्रेस.
शास्त्री, अजय मित्र. १९९१. अजंठाची नावे: आधुनिक आणि प्राचीन - पुनर्मूल्यांकन. खंड १, द आर्ट ऑफ अजंता: न्यू पर्स्पेक्टिव्हज मध्ये , रतन परिमू, दीपक कन्नल, शिवाजी पणिक्कर, जयराम पोडुवल आणि इंद्रमोहन शर्मा यांनी संपादित केलेले, ६७-७०. नवी दिल्ली: पुस्तके आणि पुस्तके.
—. १९९७. वाकाटक: स्रोत आणि इतिहास, भारतीय इतिहासाचे महान युग मालिका. नवी दिल्ली: आर्यन बुक्स इंटरनॅशनल.
सिंग, राजेश कुमार. २०१४. “अजिंठ्याचे पुरातन काळ: इतिहास, शिलालेख आणि प्रारंभिक कालक्रमानुसार विकासाशी संबंधित स्रोत आणि समस्या.” पीएचडी प्रबंध, कला इतिहास आणि सौंदर्यशास्त्र विभाग, ललित कला विद्याशाखा, एमएस विद्यापीठ बडोदा, बडोदा.
—. २०१२ब. अजिंठा लेण्यांचा परिचय: सहा लेण्यांच्या उदाहरणांसह. पहिला, पेपरबॅक. बडोदा: हरी सेना प्रेस.
—. २००९. "अजिंठा येथील शैलगृहांची गणना." जर्नल ऑफ द एशियाटिक सोसायटी ऑफ मुंबई , १२२-१२६.
सिंग, राजेश कुमार. २००९. "अजिंठा लेण्यांच्या वाकाटक टप्प्याची तारीख निश्चित करण्यात काही राखाडी क्षेत्रे." आरडी चौधरी यांनी संपादित केले. कला: द जर्नल ऑफ द इंडियन आर्ट हिस्ट्री काँग्रेस, २००८-२००९ (इंडियन आर्ट हिस्ट्री काँग्रेस आणि शारदा पब्लिशिंग हाऊस) XIV: ६९-८५.
—. २०१२अ. "अजिंठा येथील गुहा २६-संकुलाचा प्रारंभिक विकास." दक्षिण आशियाई अभ्यास , ३७-६८.
—. २०१५c. “अजिंठा काळ - मानववंशशास्त्रीय आणि समाजशास्त्रीय पार्श्वभूमीचे पैलू.” Sahapedia.org. आगामी.
सिरकर, डीसी १९६५. क्रमांक ६३--हरिषेणाच्या काळातील अजिंठा गुहा शिलालेख. खंड १, निवडक शिलालेखांमध्ये , डीसी सिरकर, ४४९-४५५. कलकत्ता: कलकत्ता विद्यापीठ.
स्पेयर, जे. १८९५. जातकमल: बुद्धांच्या जन्मकथांचा हार, बौद्ध धर्मातील पवित्र पुस्तके मालिका. खंड १. लंडन: हेन्री फ्राउड. प्रतिपादन दिल्ली १९७१, १९९०.
स्पिंक, वॉल्टर एम. २००५-२०१४. अजिंठा: इतिहास आणि विकास मालिका. जे. ब्रोंखोर्स्ट यांनी संपादित केली. सातवा खंड. लिडेन: ब्रिल.
स्पिंक, वॉल्टर एम. २००६. अजिंठा बद्दल युक्तिवाद, अजिंठा: इतिहास आणि विकास मालिका - हँडबुच डेर ओरिएंटलिस्टिक (एचडीओ) मालिका. जे. ब्रोंखोर्स्ट यांनी संपादित केली. खंड II. आठवा खंड. लीडेन: ब्रिल.
—. 2007. गुहा बाय केव्ह: अजंता, इतिहास आणि विकास मालिका - हँडबच डेर ओरिएंटलिस्टिक (एचडीओ) मालिका. J. Bronkhorst द्वारे संपादित. खंड. V. आठवा खंड. लीडेन: ब्रिल.
—. २००९. चित्रकला, शिल्पकला, वास्तुकला वर्षानुसार: अजिंठा, इतिहास आणि विकास मालिका - हँडबुच डेर ओरिएंटलिस्टिक (एचडीओ) मालिका. जे. ब्रोंखोर्स्ट यांनी संपादित केले. खंड. पाचवा. आठवा खंड. लीडेन: ब्रिल.
स्पिंक, वॉल्टर एम. १९९२. "अजिंठाचे यश." द एज ऑफ द वाकाटकस मध्ये , अजय मित्र शास्त्री यांनी संपादित केलेले, १७७-२०२. दिल्ली: हरमन.
—. २००५. सुवर्णयुगाचा शेवट: अजिंठा, इतिहास आणि विकास -- हँडबुक डर ओरिएंटलिस्टिक (HDO) मालिका. जे. ब्रोंखोर्स्ट यांनी संपादित केले. खंड १. आठवा खंड. लीडेन: ब्रिल.
Spink, Walter M., and Naomi Yaguchi. 2014. Defining Features, Ajanta: History and Development series. Edited by J. Bronkhorst. Vol. VI. VIII vols. Lieden: Brill.
Stadtner, Donald M. 2004. “Vidarbha and Kosala.” In The Vakataka Heritage: Indian Culture at the Crossroads, by Hans T Bakker, 157-165. Groningen: Egbert Forsten.
Stietencron, Heinrich von. 2004. “Questions Addressed to Walter Spink.” Chap. 8 in The Vakataka Heritage: Indian Culture at the Crossroads, edited by Hans T. Bakker, 107-108. Groningen: Egbert Forsten.
Suzuki, T., ed. 1955-61. [Mūlasarvāstivāda-Vinaya] The Tibetan Tripitaka, Peking Edition. Tibetan trans. Vols. XLI-XLIV. Tokyo-Kyoto.
Thapar, Romila. 2003. The Penguin History of Early India from the Origins to AD 1300. New Delhi: Penguin Books India.
UNESCO. 1992-2015. “Ajanta Caves.” UNESCO: World Heritage Convention. Accessed November 9, 2015. http://whc.unesco.org/en/list/242.
Vaidya, P. L. 1959. Buddhist Sanskrit Texts. 2nd ed. 1999. Vol. XXI. Darbhanga: The Mithila Institute.
Weiner, Sheila L. 1977. Ajanta: Its Place in Buddhist Art. Berkeley: University of California Press.
Yazdani, Gulam. 1952. Ajanta: Monochrome Reproductions of the Ajanta Frescoes Based on Photography, with an Explanatory Text by G. Yazdani and Appendices on the Painted and Incised Inscriptions by N.P. Chakravarti and B.Ch. Chhabra. Vol. IV. IV vols. London: Oxford University Press.
Zin, Monika. 2003. A Guide to the Ajanta Paintings: Devotional and Ornamental Paintings. Vol. II. II vols. Delhi: Munshiram Manoharlal Pvt. Ltd.
—. 2003. Ajanta: Handbook der Malereien - Devotional and Ornamental Malereien. Vol. I. II vols. Wiesbaden: Harrassowitz Verlag.
Zin, Monika, and Dieter Schlingloff. 2007. Samsaracakra: Das Rad der Wiedergeburten in der Indischen Uberlieferung. Dusseldorf: Ludicium Verlag.
[1] Archaeological Survey of India’s coordinates are slightly imprecise in the official guidebook, “Lat. 20°32’N and Long. 75°45’E” (Mitra 1996, 1), and quite incorrect on the official webpage that provides “75°40’N; 20°30’E” (Archaeological Survey of India 2011).
[2] Spink writes, ‘. . . like the ancient province of Asmaka just to the south, and Anupa to the north, ancient Risika, in which Ajanta was included, was already part of the extensive domains that Harisena inherited when he came to the power’ (W. M. Spink 2005, 7).
[3] Mirashi identifies the Aurangabad region as Mūlaka (Mirashi 1963, 124).
[४] मिराशीसाठी, 'मुलकाच्या दक्षिणेस अस्माका (आधुनिक अहमदनगर आणि भीर जिल्हे)' (मिराशी १९६३, १२४).
[5] तपशीलांसाठी, पहा (सिंग २००९).
[6] उदाहरणार्थ, पहा (मित्र १९९६, ५).
[७] भिक्षु बुद्धभद्र यांच्या दानशिलालेखासाठी पहा (छाबरा १९५२, ११४-१८).
[8] स्पिंकच्या काल्पनिक रेषा रेखांकनासाठी, पहा (सिंग २०१२अ, आकृती २६) आणि सिंगच्या ३डी स्केचसाठी, पहा (सिंग २०१२अ, आकृती ३५-३७).
[9] गुहा २६ शिलालेख, श्लोक ७-८ (छबरा १९५२, ११५).
[10] मित्रा लिहितात: 'ही [गुहा 6] एक दुमजली मठ आहे' (मित्र 1996, 36). हे तिर्यक सध्याच्या लेखकाने दिले आहे.
[11] सविस्तर अभ्यासासाठी, पहा (WM Spink 2007, 83-113) आणि (Singh 2014, खंड I, 330-48).
[12] इंग्रजी भाषांतरे दिलेल्या संदर्भांमध्ये वापरल्या जाणाऱ्या शब्दकोशांबद्दल वर्तमान लेखकाची समज दर्शवतात.
[13] गुहा २६ शिलालेख, विरुद्ध ६ (छबरा १९५२, ११५).
[१४] गुहा १६ शिलालेख, वि. २७ (मिराशी १९६३, १०९).
[१५] गुहा 16 शिलालेख, श्लोक 29, 32 (मिराशी 1963, 109).
[१६] गुहा १७ शिलालेख, वि. २४ (मिराशी १९६३, १२७).
[17] गुहा १२ शिलालेख, ओळ ३ (इंद्रजी १८८१, ६८) आणि (बर्गेस १८८३, ११६). फक्त उपा.... जतन केले आहे आणि शेवटचे अक्षर (अक्षरे) वाचता येत नाहीत. इंद्रजींचे उपासय (सं. उपाश्रय ) म्हणून वाचन नंतरच्या संपादकांनी स्वीकारले आहे.
[18] लेण्यांमधील शिलालेख १६, विरुद्ध २२ (मिराशी १९६३, १०९) आणि लेणी २६, श्लोक १४, १९ (छबरा १९५२, ११६).
[१९] गुहा 16 शिलालेख, वि. 25 (मिराशी 1963, 109).
[20] गुहा १२ शिलालेख, ओळ ३ (बर्गेस १८८३, ११६).
[२१] गुहा 17, श्लोक 24, 29 (मिराशी 1963, 127) आणि गुहा 16, वि. 31 (मिराशी 1963, 109) मधील शिलालेख.
[२२] गुहा 10 शिलालेख, ओळ 2. पूर्ण शिलालेख: धमदेवस . . . नस [।१] पसादा द[हा]नम् पवजितस [॥२], ' धमदेवसा . . . नस . . त्याग करणाऱ्यांसाठी' (कोहेन 2006, 296). लेखकाने पसादा पसादा असे शब्दलेखन केले आहे, जी संस्कृतमध्ये प्रासादची प्राकृत आहे . कोहेन यांनी जोडलेल्या नोट्समध्ये दाता धमदेवाच्या दाव्यातील अडचण ओळखली आहे की त्याने पसादा दान केला आहे . हा दावा खरा असू शकत नाही, कारण त्याच मंदिरात इतर देणगीदारांनी मंदिराचा काही भाग दान केल्याचे शिलालेख आहेत. त्यामुळे, धामदेवाने संपूर्ण पासदा दान केला असेल हे अकल्पनीय आहे .
[२३] गुहा 4, ओळ 1 (कोहेन 2006, 284) आणि गुहा 17, वि. 1 (मिराशी 1963, 124) मधील शिलालेख.
[२४] गुहा 17 शिलालेख, वि. 24 (मिराशी 1963, 127).
[25] गुहा 26 शिलालेख, विरुद्ध 13 (छबरा 1952, 116).
[26] गुहा १६ शिलालेख, विरुद्ध २४ (इंद्रजी १८८१, ७१) आणि (मिराशी १९६३, १०९). त्याच पानाच्या टीप ९ मध्ये, बर्गेस पुढे म्हणाले: 'हे [चैत्य-मंदिर] आता सापडत नाही: ते कदाचित संरचनात्मक आणि बाह्य असावे.' ही टिप्पणी आधुनिक इतिहासकारांच्या गैरसमजाचे प्रतिनिधित्व करते की चैत्य किंवा स्तूप या शब्दाचा अर्थ केवळ बुद्धाचे प्रतीकात्मक प्रतिनिधित्व आहे, मानववंशीय नाही. गुहा १७ शिलालेखातही, ' मुनिराजचैत्यम्' आणि ' स्तूपविहार' या शब्दांचा वापर स्पष्टपणे तेथे असलेल्या प्रतिमा मंदिराचा संदर्भ देतो. हे स्पष्ट आहे की अजिंठा बनवणाऱ्या लेखकांसाठी आणि प्रतीक (म्हणजेच तथाकथित स्तूप) आणि प्रतिमेमध्ये कोणताही भेदभाव, ध्रुवीयता किंवा प्रतिरूप नव्हता. प्रतीकात्मकदृष्ट्या देखील ही वस्तुस्थिती सर्वात स्पष्टपणे सिद्ध होते, कारण १९ आणि २६ गुहांमध्ये स्तूप आणि प्रतिमा एकाच कृत्रिम ऐक्यात एकत्र उभे आहेत.
[२७] गुहा 17 शिलालेख, वि. 22 (मिराशी 1963, 126).
[२८] गुहा 17 शिलालेख, वि. 27 (मिराशी 1963, 127).
[29] गुहा 26 शिलालेख, श्लोक 7-8 (छबरा 1952, 115, 117 पृ.7).
[३०] गुहा 16 शिलालेख, ओळ 19, वि. 24 (मिराशी 1963, 109).
[३१] गुहा 16 शिलालेख, ओळ 19, वि. 24 (मिराशी 1963, 109).
[३२] गुहा 16 शिलालेख, ओळ 19, वि. 24 (मिराशी 1963, 109).
[33] सुविथी या शब्दाचा अर्थ लांब पोर्च, रस्ता असाही होतो. दिलेल्या संदर्भात, मिराशीचे वर दिलेले भाषांतर सर्वात योग्य आहे.
[३४] गुहा 16 शिलालेख, ओळ 19, वि. 24 (मिराशी 1963, 109).
[35] वेदिका म्हणजे संदर्भानुसार अनेक गोष्टींचा अर्थ होतो: पवित्र वेदी, मंदिराच्या अंगणातील चतुर्भुज जागा, भिंतींनी झाकलेला इमारतीचा भाग, रेल, कठडा, कठडा इ. मिराशी त्याचे भाषांतर कठडा असे करतात (१९६३, १११). गुहेत दिसण्यासाठी कोणताही कठडा किंवा कठडा नाही. पोर्चच्या बाहेरील ओहोटीचा अर्थ देखील कठडा किंवा वेदिका असा करता येत नाही . म्हणून, संदर्भाचा अर्थ वर दिलेल्याप्रमाणेच असावा.
[३६] गुहा 16 शिलालेख, ओळ 19, वि. 24 (मिराशी 1963, 109).
[३७] गुहा 16 शिलालेख, ओळ 19, वि. 24 (मिराशी 1963, 109).
[38] गुहा १० शिलालेख (बर्गेस १८८३, ११६).
[39] गुहा १० शिलालेख (कोहेन २००६, २९६-९७).
[40] पूर्वीच्या फारशा संशोधनावर अवलंबून नसल्यामुळे, जेम्स बर्गेस लेण्यांशी डेटिंग करताना त्यांचे दुःख लपवू शकले नाहीत, ही डेटिंग अनेक दशकांपर्यंत टिकून राहणार होती: 'जर आपण लेण्या I, II, XVI, XVII, इत्यादींमधील चित्रांची सामान्यता सहाव्या शतकाशी जोडली तर आपण कदाचित फारसे चुकीचे ठरणार नाही, जे आपण काही रंगवलेल्या शिलालेखांमध्ये आणि व्यक्तिरेखांच्या नावांमध्ये वापरल्या जाणाऱ्या वर्णमाला अक्षरांच्या शैलीवरून मिळवू शकतो. नंतरची चित्रे नंतर सातव्या शतकाची असू शकतात आणि लेण्या IX आणि XV मधील सुरुवातीची चित्रे कदाचित दुसऱ्या शतकाचीही असू शकतात - आंध्रभृत्य राजांच्या काळात, आमच्या काळातील पहिल्या तीन शतकांमध्ये बौद्ध धर्माचे महान संरक्षक' (बर्गेस 1880, 285).
[41] अलीकडील आढावासाठी, पहा (रुएग 2004, 5-18, 28-31).
[42] गेल्या काही दशकांमधील अनेक प्रकाशने अशा डेटिंग शैलीचे अनुसरण करतात. त्यांचा उल्लेख करणे इतके जास्त आहे.
[43] नागराजू यांनी सुरुवातीचा टप्पा सुमारे 220 BCE ते 100 BCE पर्यंत दिला आहे (नागराजू 1981, चार्ट v). यजदानी यांनी दुसऱ्या शतकातील सर्वात जुने काम असे वर्गीकृत केले आहे: 'अजिंठा येथील गुहेत चित्रकलेचे असे नमुने आहेत ज्यात शिलालेख आहेत जे तज्ञ शिलालेखकारांच्या मते एकमताने दुसऱ्या शतकाच्या मध्यात नियुक्त केले गेले आहेत. या सुरुवातीच्या उदाहरणांमध्येही चित्रकला बऱ्यापैकी विकसित झाली आहे आणि शेकडो वर्षांपासूनच्या परंपरेचे सराव आणि सातत्य दर्शवते.' [(यजदानी 1952, 2)] ढवळीकर यांनी एकदा म्हटले होते की, 'सामान्यतः असे गृहीत धरले जाते की पश्चिम भारतातील हीनयान क्रियाकलाप दुसऱ्या शतकाच्या अखेरीस थांबला आणि 5 व्या शतकाच्या उत्तरार्धात महायानवाद्यांनी पुन्हा सुरू केला, जर आपण वॉल्टर एम. स्पिंक यांनी प्रस्तावित केलेल्या अजिंठा येथील लेण्यांच्या नंतरच्या गटासाठी कालक्रम स्वीकारला तर. सुमारे तीन शतकांच्या अंतरादरम्यान काय घडले हे माहित नाही.' [ (ढवळीकर १९८४, १)] श्लिंगलॉफच्या अजंठ्यावरील त्यांच्या महान कादंबरीच्या दोन विभागांच्या शीर्षकांवरून त्यांचे डेटिंग स्पष्ट होते : '१. इ.स.पूर्व दुसऱ्या शतकातील चित्रे. २. इ.स.च्या पाचव्या शतकातील चित्रे' [ (श्ल्लिंगलॉफ २०१३, ३-४)]
[44] यापैकी काही पूर्वीच्या लेण्या पाचव्या शतकाच्या काळात तथाकथित 'अनाहूत' चित्रे, स्ल्टप्युअर्स, शिलालेख इत्यादी वापरून पुन्हा तयार करण्यात आल्या. यावरील तपशीलांसाठी, पहा (WM Spink 2006, 199-271).
[45] यापैकी, लेणी 9 आणि 10 मंदिरे आहेत आणि उर्वरित (लेणी 12, 13 आणि 15A) मठवासी निवासस्थाने आहेत. 2012 मध्ये आणखी एक गुहा अलीकडेच उघडकीस आली आहे. ही एक साधी गुहा आहे ज्यामध्ये कोणतेही चित्र, शिलालेख किंवा कोरीवकाम नाही. ही एक कोठडी आहे जी गुहा 26 च्या खाली नदीच्या पात्राजवळ ढिगाऱ्यात गाडली गेली होती (आकृती 9). ती प्रथम पीएचडी प्रबंधात समाविष्ट करण्यात आली होती (सिंग 2014, खंड II, आकृती 212-13), आणि तीच येथे प्रथमच प्रकाशित होत आहे. ती कोणत्या टप्प्याशी संबंधित आहे हे आम्हाला माहित नाही. प्रथमदर्शनी, ती आधीच्या टप्प्याशी संबंधित दिसते.
[४६] 'वासिठिपुतस कट हादिनो घरमुख दानम्' (बर्गेस १८८३, ११६); लाकडी दर्शनी भाग हे वशिथीच्या मुलाचे दान आहे (लेखकाचे भाषांतर).
[47] अमरावती आणि नागार्जुनीकोंडा व्यतिरिक्त, प्राचीन आंध्रदेशातील इतर अनेक कमी ज्ञात किंवा नव्याने शोधलेली बौद्ध स्थळे आहेत जी वेगवेगळ्या काळातील आहेत. अपुर्या अभ्यासामुळे, अजिंठा आणि या स्थळांचा संबंध सांगणे कठीण आहे. त्यापैकी काही आहेत अल्लुरु, अलुगुडू, बाविकोंडा, भाटीप्रौडू, चिन्नागंजम, चंदावरम, डौपडू, दहुडकाटा, वारिकामटा, गरिकामटा. Neḷakōṇḍapaḷḷī, Gudīvāḍā, Gajurabanda, Fanigiri, Uppuguṇḍuru, Pedoganjam, Rama Tirtham, Sankram, Salihundam, and तोलाकोंडा.
[48] उत्तर भारत आणि उत्तरेकडील महामार्गांना उत्तरापथ म्हणून ओळखले जात असे. दक्षिण भारत आणि दक्षिणेकडील महामार्गांना दक्षिणापथ म्हणून ओळखले जात असे.
[49] यजदानीला वाटले की अजिंठा येथील विकास हा एक सततचा व्यवहार होता: 'इ.स.पू. दुसऱ्या शतकापासून ते इ.स.पू. पाचव्या शतकापर्यंतच्या तंत्राच्या विकासाची सततची कहाणी सांगणाऱ्या नवव्या आणि दहाव्या लेण्यांमध्ये नमुने आहेत.... चौथ्या किंवा पाचव्या शतकापर्यंत अजंठ्यात निळ्या रंगाचा पूर्णपणे अभाव आहे' [(यजदानी १९५२, २)] '.... हे चित्र [गुहा दहावा, षडदंत जातक] कदाचित तिसऱ्या शतकातील आहे.... [श्याम जातक] हे तिसर्या शतकातील इसवी सनाच्या शेवटच्या तिमाहीपासून ते चौथ्या शतकाच्या पहिल्या तिमाहीपर्यंत, म्हणजेच वाकाटकांच्या सार्वभौमत्वाच्या अगदी आधीच्या काळापर्यंतच्या काळातले असू शकते...' [(यजदानी १९५२, ३)] तारीख पुन्हा पृष्ठावर आढळते. १, 'चौथ्या आणि पाचव्या शतकात, वाकाटक राजांच्या प्रबुद्ध संरक्षणाखाली, अजिंठा बौद्ध धर्म आणि कलांचे एक महत्त्वाचे केंद्र बनले...' [(यजदानी १९५२, १)] पृष्ठ २ वर, यजदानी सहाव्या शतकातील विकासाबद्दल बोलतात, परंतु सातव्या शतकातील कोणत्याही विकासाला नकार देतात: 'शाही संरक्षणाच्या अभावामुळे, सहाव्या शतकाच्या उत्तरार्धात अजिंठा येथील कला वेगाने कमी होऊ लागली आणि अजिंठा येथे कोणताही विहार किंवा चैत्य नाही , जो निश्चितपणे सातव्या शतकातील आहे असे म्हणता येईल' [(यजदानी १९५२, २)]
[50] उदाहरणार्थ, पहा (श्लिंगलॉफ २०१३, ३-४). मोनिका झिन लिहितात, 'अजिंठा येथील मठांचे संकुल, जे इ.स.पू. पहिल्या शतकात आणि इ.स.च्या पाचव्या शतकात बांधले गेले होते , ते आज आपल्यासाठी खूप वेगळे वाटते...' (झिन २००३, १).
[51] स्पिंकच्या कल्पनांवरील प्रश्न आणि टीकांसाठी, खंडाळावाला [(1990), (1991)], देशपांडे [(1992), (1996), (2002a), (2002b), (2002c)], जामखेडकर (1991), शास्त्री (1997, xii, 209), बेकर (1997, 37 क्रमांक 127), आणि स्टीटेनक्रॉन (2004) पहा. त्यापैकी बरेच स्पिंकच्या उत्तरांसह (WM स्पिंक 2005) मध्ये पुनरुत्पादित केले आहेत.
[52] पहा (बेकर 1997, 34).
[53] पहा, सिंग [(2009), (2012a, 37), (2012b, 28), (2014, 25)].
[54] सुरुवातीच्या भारतीय इतिहासावरील एका प्रमुख पुस्तकात (थापर २००३) हरिषेणाचा उल्लेख नाही.
[55] सध्याचा लेख हा पाचव्या शतकातील अजिंठा काळातील राजकीय परिस्थितीचा केवळ एक आराखडा आहे. त्यातील मजकूर सध्याच्या संशोधनावर आधारित आहे ज्यामध्ये शिलालेखनाचा नवीनतम संग्रह, जागेवरील पुरातत्वीय पुरावे, नाणेशास्त्र, प्रतिमाशास्त्र, साहित्यिक आणि मजकूर स्रोत, इतिहासलेखन आणि संबंधित ऐतिहासिक साहित्याचा अनुमानात्मक शोध यांचा समावेश आहे. जर लेखकाच्या लक्षात कोणतीही महत्त्वपूर्ण चूक आली तर तो लागू असेल तेथे ती चूक पुन्हा तपासण्यास आणि दुरुस्त करण्यास तयार आहे.
[56] हरिषेणाच्या थाळनेर ग्रँटनुसार, राजाला 'महाराज' ही पदवी होती (शास्त्री १९९७, ११२). उल्लेखनीय म्हणजे, वंध्यशक्ती प्रथमला सम्राट आणि धर्म-महाराज ही पदवी होती; प्रवरशेण प्रथमला धर्म-महाराज आणि हरितीपुत्र ही पदवी होती. हरिषेणसह उर्वरित राजांना फक्त महाराज असे संबोधले जाते.
[57] वॉल्टर एम. स्पिंक यांच्या मते, हरिषेणाने सुमारे इसवी सन ४६० ते सुमारे ४७७ पर्यंत राज्य केले ( (डब्ल्यूएम स्पिंक २००६); (डब्ल्यूएम स्पिंक २००५-२०१४)). हान्स टी. बेकर यांनी याला मान्यता दिली आहे: 'आम्ही स्पिंक यांच्याकडून असे गृहीत धरतो की देवसेनाचा मुलगा हरिषेण सुमारे इ.स. ४६० मध्ये वत्सगुल्मच्या सिंहासनावर बसला' (बेकर १९९७, ३४). यजदानी आणि मिराशी यांनी थोड्या वेगळ्या तारखेचा प्रस्ताव मांडला होता: 'प्रसिद्ध इतिहासकारांच्या मते राजा हरिषेण (व्हीव्ही मिराशी, हैदराबाद पुरातत्व मालिका , क्रमांक १५, पृष्ठ ३), इ.स. ४७५-५०० या काळात भरभराटीला आला' (यजदानी १९५२, १).
[58] ग्रोनिंगेन ओरिएंटल स्टडीज कोलोक्वियम ऑन द वाकाटक (ग्रोनिंगेन ६-८ जून २००२) मध्ये, असे समेट करण्यात आला की वाकाटकांच्या दोन शाखांना सोयीस्करपणे पूर्व वाकाटक आणि पश्चिम वाकाटक असे संबोधले जाऊ शकते, जिथे वाकाटकांची राजधानी नंदीवर्धन (नागर्धन, तालुका रामटेक , जिल्हा नागपूर) येथे होती आणि नंतरची राजधानी वत्सगुल्मा (जिल्हा वाशिम) येथे होती. पहा (कुलके २००४, ३).
[59] अजिंठा येथील काही दान शिलालेखांमध्ये स्पष्टपणे उल्लेख आहे की देणग्या संघासाठी होत्या . परंतु बहुतेक दान शिलालेखांमध्ये देय धर्मो देय धर्ममो (धर्माला दान) हा वाक्यांश वापरला आहे. संघ आणि धर्म हे त्रिरत्नाचे भाग आहेत , म्हणजेच बौद्ध त्रिमूर्ती: बुद्ध, धर्म आणि संघ. बौद्ध कला आणि पुरातत्वशास्त्रात त्रिरत्नाची प्रतिमा पद्धतशीरपणे दर्शविली गेली आहे, अजिंठा याला अपवाद नाही. शिलालेख आणि प्रतिकात्मक चित्रण असे दर्शविते की अजिंठा येथे कोणत्या ना कोणत्या स्वरूपात संघाची उपस्थिती असावी, हा मुद्दा विद्वत्तामध्ये दुर्लक्षित केला जातो. हा मुद्दा एका प्रश्नाकडे नेतो. जर तेथे संघ असता तर मठाच्या विकासात आणि कार्यात त्याची भूमिका काय होती?
[६०] वराहदेवाच्या शिलालेखांसाठी पहा (मिराशी १९६३, १०३-११९).
[61] स कुन्तलावन्तिकलिङ्गकोसलत्रिकूटलाटान्ध्र[परान्त] जानिमान [।] U - U - - U U शौर्यविश्रुतानपि स्वनिर्देशगुणाति - U – [18 ||]; sa kuntalāvantikaliṉgakōsalatrikūṭalāṭāndhra[parānta] jānimān [|] U – U — U - U śauryaviśrutānapi svanirdeśaguṉāti – U – [18||] [ (Mirashi 1963, 108)]. Sircar reads शौर्यविश्रुतान् as –U नैरधृतान् (1965, 453); परान्त parānta is supplied by Gokhale (Gokhale 1992).
[62] Kuntala = Kannada country, district round Banavāsi. Avanti = western Mālwā, capital Ujjain. Kalinga = the country between Mahānadī and Godāvarī; in the narrow sense = Purī-Ganjam region of Orissā. Kōsala = South Kosala = modern Chattisgaḍh and adjoining parts of Orissa, including Rājpur-Sambalpur-Bilāspur region. Trikūṭa = country to the west of Nāsik. Lāṭa = central and southern Gujarāt, between Mahi and Tāpi; Nausāri-Bharuch region. Āndhra = the Telugu speaking country to the south of Godāvarī. Aparānta = the northern Koṇkan. [ (Sircar 1965, 453, n. 2) and (Mirashi 1963, 107)]
[63] V. V. Mirashi in CHI, III, Part I, p. 144. See also CII, V, p. xxxi. Vide for a somewhat exaggerated account, Vākāṭaka Nṛipati āni Tyānchā Kāla, p. 59. [Note in original.]
[64] Walter M. Spink, “The Achievements of Ajanta”, AV, p. 117. [= (W. M. Spink 1992, 117); note in original.]
[65] On the subject of the disputed verse 18 of Varāhadeva’s donative inscription, Bakker offers a reconostructive or conjectural reading for supplying a sense for the missing words: ‘He [i.e. Hariṣeṇa], [stands above] these foreign kings of Kuntala, Avantī, Kalinga, Kōśala, Trikūṭa, Lāṭa, and Āndhra, renowned fro their valour and courage, their own names […]’. [ (Bakker 1997, 35)]
[66] See Deshpande [ (Deshpande 1992), (Deshpande 1996), (Deshpande 2002c), and (Deshpande 2002b)].
[67] For the donative inscription of Cave 17, see (Mirashi 1963, 120-129).
[68] For the donative inscription of Cave 20, see [ (Indraji 1881, 76-77), (Burgess 1883, 132)].
[69] Author’s transliteration in Devanāgarī.
[70] For the Cave 4 inscription, see (Cohen 2006, 284).
[71] For the changing contours of Āryāvarta and Greater Magadha, see (Bronkhorst 2007).
[72] For the contours of Greater Magadha, see (Bronkhorst 2007, 1-9).
[73] वाकाटकांनी नाणी काढली की नाही यावर वाद आहे. १९९७ मध्ये, शास्त्रींनी नाण्यांचा एक संग्रह प्रकाशित केला (१९९७, १३६-१४६) जो त्यांनी वाकाटकांचा म्हणून ओळखला. एलेन एम. रेवेन (२००४) यांनी या संग्रहाचा अधिक अभ्यास केला. तथापि, शंकर गोयल मानतात की हा संग्रह बनावट आहे (२०१२, ४, ७-१४). गोयल असा युक्तिवाद करतात की वाकाटकांमध्ये मोठ्या शहरीकरणाशिवाय सामंतवादी समाजशास्त्रीय व्यवस्था होती. ते पूर्वसुरी आणि समकालीनांच्या गायी किंवा स्वस्त धातूच्या नाण्यांचा वापर करत होते.
[74] ब्राह्मणवाद हा शब्द हिंदू धर्माइतकाच समस्याप्रधान आहे. पहिला शब्द रिडक्शनिझमपासून उद्भवतो; तो पारंपारिक वर्ण -आधारित भारतीय समाजशास्त्र बनवणाऱ्या चार वर्णांपैकी एकाचा 'वाद' दर्शवतो ; तो इतर तीन अनिर्दिष्ट ठेवतो. तर नंतरचा शब्द कालबाह्य आहे. रोमिला थापर अधिक चांगल्या प्रकारे सांगतात: 'या टप्प्यावर [प्रारंभिक भारत] हिंदू धर्म हा सामान्य शब्द वापरणे ऐतिहासिकदृष्ट्या एक कालबाह्य आहे. इसवी सनाच्या पहिल्या सहस्राब्दीच्या सुरुवातीस "हिंदू" हा शब्द वापरला जात नव्हता आणि आज आपण ज्याला 'हिंदू' पंथ म्हणतो त्याचे समर्थक होते त्यांनी त्यांचा धर्म ओळखण्यासाठी त्यांच्या सांप्रदायिक लेबल्सचा वापर केला. म्हणून, त्यांनी स्वतःला वैष्णव आणि शैवांच्या व्यापक लेबल्स किंवा त्यांच्यामध्ये, भागवत, पशुपत इत्यादींच्या संकुचित लेबल्सने ओळखले. धार्मिक ओळखीची जाणीव पंथाची होती, प्रत्येक पंथाचा समावेश असलेल्या सर्वसमावेशक धर्माची नव्हती.' [(थापर २००३, २७५)]
[७५] पहा (बेकर १९९७) आणि (बेकर २००४).
[७६] पूर्ण श्लोक असा आहे: '. . . . नत्यद्भुतपुण्यराशिः [|*] चक्रे भुव स्तूपविहारभूषां दानोदयैश्चार्थिजनप्रमोदम् || [२२||*]; . . . natyadbhutapuṇyarāsih [|*] चक्रे भुव स्तुपविहारभूषाम दानोदयेशाचाार्थिजनप्रमोदम् || [२२||*]; . . . ज्याच्याकडे गुणवत्तेचे अद्भूत भांडार आहे. . . . स्तूप आणि विहारांनी पृथ्वी सुशोभित केली आणि (त्यावर) भेटवस्तू देऊन विनवणी करणाऱ्यांचा आनंद दिला.' [ (मिराशी १९६३, १२६, १२९)]
[77] नदीच्या पलीकडे अजिंठा येथेच एक विटांचा मठ होता. २०१२ मध्ये, वर्तमान लेखकाने अजिंठा लेण्यांपासून काही किमी अंतरावर असलेल्या फर्दापूरला लागून असलेल्या ठाणा गावात एका प्राचीन विटांच्या बांधकामाचा पाया पाहिला. ही सूचना आम्हाला गुंफा १२ च्या शिलालेखाशी ठणा गावाचा संबंध जोडण्यास सक्षम करते: 'थानको देयधम्मम घनामदस वणिजस सौवरको सौपा [सथो], ठणको देयधामम घनामददमदम, सौव्रसौप्य [सौव] सौवांची भेट . घनामदडा [ टहानाचा ] व्यापारी [ (बर्गेस आणि इंद्रजी 1881, 68) ; (बर्गेस 1883, 116)]. घाटकच येथे मला पाचव्या शतकातील विटा घाटाच्या वरच्या शेतात विखुरलेल्या आढळल्या आहेत . तिथेही एक विटांचे मठ असावे, जे नष्ट झाले आहे. वेरूळ येथे विटांच्या इमारती होत्या; त्यापैकी काही आजही दिसतात. त्या नष्ट होण्याच्या मार्गावर आहेत. अशाप्रकारे, लाकूड, दगड आणि विटांनी बनवलेले अनेक मठ होते जे नष्ट झाले आहेत. असे म्हणता येणार नाही की दगडात कोरलेले मठ एकमेव प्रकारचे होते. फा-हियान आणि झुआनझांग यांनी भेट दिलेल्या प्रत्येक प्रदेशात अनेक मठांचा उल्लेख केला आहे.
[78] १८८० मध्ये, जेम्स बर्गेस यांनी वेरूळच्या बौद्ध लेण्यांचे वय ३५०-५५० CE (फर्ग्युसन आणि बर्गेस १८८०, ३६८) असे सांगितले. १८८३ मध्ये, त्यांनी त्या ४५०-७०० CE (बर्गेस १८८३, ४) च्या असल्याचे सांगितले. यजदानी यांनी ते सातव्या शतकातील असल्याचे सांगितले: 'सातव्या शतकात उत्खनन केलेल्या वेरूळच्या बौद्ध मंदिरांवर दक्षिण भारतातील ब्राह्मणी स्थापत्यकलेचा स्पष्ट प्रभाव दिसून येतो...' [(यजदानी १९५२, २)] गेरी एच. मलांद्रा यांनी यजदानीच्या तारखेचे बारकाईने पालन केले: 'हे स्थळ [वेरूळ] तीन प्रमुख टप्प्यांमध्ये विकसित झाले, एक प्रारंभिक ब्राह्मणकालीन टप्पा ( सुमारे ५५० ते ६००), एक बौद्ध टप्पा ( सुमारे ६०० ते ७३०), आणि शेवटचा टप्पा ( सुमारे ७३० ते ९५०), ज्यामध्ये वेरूळचे एकमेव ज्ञात प्राचीन संरक्षक राष्टकूट राजवंशाने प्रायोजित केलेले ब्राह्मण आणि जैन उत्खनन दोन्ही समाविष्ट होते.' [(मलांद्रा १९९३, ५)] तथापि, दीपक कन्नल यांनी ते सहाव्या शतकातील असल्याचे सांगितले आहे (कन्नल १९९६, १३०). वेरूळच्या बौद्ध लेण्यांचा इतिहास सातव्या शतकातील असल्याचे सांगताना स्पिंक बर्गेस, यझदानी आणि मलांद्राच्या जवळ आहे (स्पिंक, वैयक्तिक संवाद).
[79] दंडीनच्या दशकुमारचरिताच्या आठव्या अध्यायाला विश्रुतचरित म्हणतात. दंडीनच्या इतर कामांप्रमाणे हा अध्यायही काल्पनिक शैलीत लिहिलेला आहे. तथापि, या काल्पनिक कथेचे कथानक काही प्रमाणात वास्तविक ऐतिहासिक घटनांवर आधारित असल्याचे दिसून येते. या घटना वाकाटक राजवंशाच्या हळूहळू पतनाच्या होत्या. दंडीनने ऐतिहासिक व्यक्तिरेखांची नावे बदलली आहेत आणि त्याव्यतिरिक्त चरिताच्या ( अलंकृत चरित्र) उद्दिष्टांना अनुकूल असे अनेक नाट्यमय आणि काल्पनिक घटक सादर केले आहेत. तरीही, विवेकी नजरेला, संबंधित ऐतिहासिक आणि भौगोलिक डेटा सापडू शकतो, विशेषतः अजिंठा आणि वाकाटकांशी संबंधित इतर ऐतिहासिक स्त्रोतांच्या पुरातत्वीय पुराव्यांसह अभ्यासल्यास. या मताच्या बाजूने असलेले इतिहासकार कॉलिन्स (१९०७), मिराशी [(१९६०), (१९६३)], (डब्ल्यूएम स्पिंक २००५, ११९-१६२, १६९-१७८, ३९३-४११), आणि (डीकॅरोली १९९५) आहेत. हा विषय वादग्रस्त आहे. वादाच्या आढावासाठी, पहा (सिंग २००९, ७२-७६).
[80] पहा (सिंग २०१५c).
[81] (स्पिंक, वैयक्तिक संवाद) आणि (मालंद्र 1993, 123) यांनी सुचविले.
[82] यजदानी यांनी असे निरीक्षण केले की 'सहाव्या शतकाच्या पहिल्या सहामाहीत दख्खनच्या सार्वभौमत्वात वाकाटकांनंतर आलेले चालुक्य कदाचित त्यांच्या पूर्वसुरींइतके बौद्ध धर्माला अनुकूल नव्हते, जरी चालुक्यांनी त्यांच्या राजधानी बदामी येथे बांधलेली तीर्थक्षेत्रे मोठ्या प्रमाणात बौद्ध विहारांमधून कॉपी केलेली आहेत . ' [ (यजदानी १९५२, २)]
[८३] बहुश्रुतः हा शब्द बुद्धभद्राच्या समर्पित शिलालेखात आढळतो. आम्हाला आश्चर्य वाटते की ते मुख्य प्रवाहातील बौद्ध धर्मातील अठरा निकायांपैकी एकाशी संबंधित आहे का . छाबरा यांनी त्यांच्या श्लोकाच्या भाषांतरातून हा शब्द सोडला आहे असे दिसते: 'यो बुद्धशासनिम् समबुद्ध्य) भिक्षुर्व्ययसभिनवेभिजनोपपन्नः [। [१६ ॥*], 'यो बुद्धशासनगतं समबुद्ध्य जातो भिक्षुर्व्य(र्व्वा)यस्यभिनवेभिजनोपपन्न[ह |*] बहुश्रुत: श(ई)लविशुद्धचेता (लोकास्य मोक्षया कृ)ताधिकारः || (१६ ||*), जो एका कुलीन कुटुंबात जन्मला होता, ज्याचे मन धार्मिक आचरणाने शुद्ध झाले होते ( लोकांना मुक्तीच्या मार्गावर नेण्यास सक्षम होते ), बुद्धांच्या शिकवणींचा मार्ग पूर्णपणे आत्मसात करून, तो त्याच्या लहानपणीच भिक्षू बनला.' [(छब्र १९५२, ११६, ११८, वि. १६)]
[८४] पहा (श्लिंगलॉफ 2013) आणि (झिन आणि श्लिंगलॉफ 2007).
[८५] मूलसर्वास्तिवाद-विनयासाठी , श्लिंगलॉफ यांनी जर्मन आवृत्ती उद्धृत केली. (Schiefner 1876-1878) = इंजि. ट्रान्स. (Schiefner 1882), Snk. एड (दत्त 1947-50), टिब. एड (सुझुकी 1955-61), इंजि. एड (ग्नोली 1977-78).
[८६] आर्याशुराच्या जातकमालासाठी , श्लिंगलॉफ इतर गोष्टींसह (केर्न १८९१), (स्पेयर १८९५), (वैद्य १९५९), (खोरोचे १९८९) उद्धृत करतात.
[८७] अश्वघोषाच्या सौंदरानंदसाठी , श्लिंगलॉफ इतर गोष्टींबरोबर (जॉन्स्टन १९२८) उद्धृत करतात.
[८८] 'सिद्धम् देयधर्ममो यम शाक्यभिक्षो म अपरशैल… नियस्य मातापितृ…, सिद्धम देयधर्ममो-यम शाक्यभिक्षो म अपारशैला.i… न्यास्य मातापित्रि...' [३६]
[८९] 'शाक्यभिक्षो म अपरशैलनिकायस्य' [(कोहेन २००६, ३३१)]
[९०] 'शाक्यभिक्षो[र]-म[हा]यान… [नियस्य मातापितृ]…, शाक्यभिक्षो[आर*]-मा[हा]यान [नियास्य माता-पितृ]… ' [ (चक्रवर्ती १९५२, ११२)]
[९१] 'विपश्वी सम्यकसम्बुद्ध चेतिक[…]रिकस्य [|*], vi(pa)śv(i) samya(k)saṁbu(ddhaḥ) cetika.rikasya. ' [(कोहेन 2006, 304)]
[92] अजिंठा येथील तथाकथित 'अनाहूत' प्रतिमांच्या तपशीलवार अभ्यासासाठी, पहा (WM Spink 2006, 116 ff.).
[93] शास्त्री (१९९७, २०९-२१०).
[94] स्पिंकचे खंड पहा (डब्ल्यूएम स्पिंक २००५-२०१४). लेणी १, २, १६ आणि १७ शी संबंधित काही अतिरिक्त पुराव्यांसाठी, पहा (सिंग २०१२ब); लेणी २६ साठी, पहा (सिंग २०१२अ).
[९५] अजिंठा गुहा १६ शिलालेख, वि. १७, पहा (मिराशी १९६३, १०८, ११०)]. घटोत्कच गुंफा शिलालेख, वि. १३, पहा (मिराशी १९६३, ११७, ११९). अजिंठा लेणी 17 शिलालेख, विरुद्ध 21, पहा (मिराशी 1963, 126, 129). तसेच, पहा (बर्गेस 1883, 128).
[96] यजदानीलाही असे वाटले की वाकाटक बौद्धांचे समर्थन करतात; तेव्हा त्याला हे फारसे माहित नव्हते की बौद्धांना संरक्षण देणारे केवळ हरिषेण होते, संपूर्ण वाकाटक राजवंश नाही. यजदानीच्या शब्दात सांगायचे तर: 'बौद्ध श्रद्धा आणि कलेच्या प्रसाराला वाकाटक राजांनी दिलेला पाठिंबा हस्तीभोज आणि त्याचा मुलगा वराहदेव यांच्या धार्मिक उत्साहामुळे मिळाला असावा, राजवंशातील शेवटचे दोन राजे, देवसेन आणि हरिषेण यांचे मंत्री, ज्यांनी बौद्ध धर्म स्वीकारला होता आणि ज्यांची नावे अजिंठा येथील गुहेतील XVI आणि परिसरातील घटोटकाच येथील विहारातील शिलालेखांमध्ये जतन केलेली आहेत (सं. ३: व्ही. मिराशी, हैद्राबाद पुरातत्व मालिका, क्रमांक १४, पृष्ठ २, आणि घटोटकाच शिलालेख , पृष्ठ ८-१७).' [ (यजदानी १९५२, १)]
मध्य भारत आणि दख्खनमधील प्रसिद्ध प्राचीन राजवंश. विसाव्या शतकातील सत्तरच्या दशकापर्यंत वाकाटक राजवटीच्या घडामोडींचे अवलोकन गुप्त साम्राज्याच्या परिप्रेक्ष्यातच केले जात असे. विशेषतः या काळातील कला इतिहासाचे गुप्त-वाकाटक अशा संयुक्त शीर्षकाखालीच वर्णन केले गेले. त्यामुळे वाकाटक कालखंडातील कला ही शैलीच्या दृष्टीने स्वतंत्र अशी वैशिष्ट्यपूर्ण कला होती, याची दखल घेतलेली दिसत नाही. परंतु अलीकडे झालेल्या विपुल संशोधनानंतर वाकाटक कालखंडाचे भारतीय कलाइतिहासातील योगदान समोर आले. विशेषत: काही कला प्रकारांमध्ये हा काळ जागतिक कला इतिहासात मानाने गौरविलेला आहे. उदा., अजिंठा. प्रस्तुत नोंदीत शिल्पकला आणि इतर तत्कालीन कलाविशेषांचा विचार केला गेलेला आहे.

इ. स. तिसर्या शतकाच्या मध्यावधीत वाकाटक घराण्याचे स्वतंत्र अस्तित्व मध्य भारत (दक्षिण माळवा) आणि विदर्भात स्थापित झाले. इ. स. पाचव्या शतकाच्या अखेरपर्यंत वाकाटक प्रबळ राजसत्ता म्हणून दख्खन आणि त्या लगतच्या प्रदेशांवर राज्य करीत होते. या घराण्याच्या मुख्यत: नंदिवर्धन (नगरधन, जि. नागपूर) आणि वत्सगुल्म (वाशीम) अशा दोन प्रमुख शाखा होत्या. उपलब्ध पुरातत्त्वीय साधनांच्या आधारे या दोन शाखांचे ऐतिहासिक अस्तित्व दिसते. वाकाटक राजसत्तेचा परमोच्च सत्ताविस्तार हा प्रवरसेन दुसरा या राजाच्या कालखंडात झाल्याचे अभिलेखीय पुराव्यांवरून स्पष्ट होते. उत्तरेकडे विंध्य पर्वतापासून ते दक्षिणेत कुंतल (उत्तर कर्नाटक) देश, तर पूर्वेकडे दक्षिण कोसल (छत्तीसगढ) पासून पश्चिमेकडे कोकणपर्यंत त्यांच्या राज्याचा प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष प्रभाव जाणवतो. हा भौगोलिक विस्तार वाकाटक कालखंडातील कला समजण्यासाठी अत्यंत आवश्यक आहे.
सातवाहन काळात प्रामुख्याने मध्य महाराष्ट्र हा सत्तेच्या केंद्रस्थानी होता. परंतु वाकाटक काळात हे सत्तेचे केंद्र पूर्व विदर्भाकडे स्थलांतरित झाल्याचे दिसते. हा प्रदेश अगदी प्रारंभिक काळापासून विविध प्रकारच्या जनजमातींच्या समुदायांनी व्यापलेला होता. या सामाजिक पार्श्वभूमीचा सुद्धा वाकाटक कलेच्या प्रारंभिक शैलीवर प्रभाव पडला असण्याची शक्यता आहे. वरील संक्षिप्तपणे वर्णन केलेल्या भू-राजकीय परिप्रेक्ष्यातच कलाइतिहास तज्ज्ञांनी वाकाटक कलेची निर्मिती, विस्तार व प्रभावाचा विचार केलेला आहे. वाकाटक कला आणि त्या कलेची वैशिष्ट्ये पुढील प्रश्नांच्या अनुषंगाने समजून घेणे अत्यंत आवश्यक आहे : वाकाटक कलेची पार्श्वभूमी कशी तयार झाली? वाकाटक कलेची मानक वैशिष्ट्ये कोणती? वाकाटक कलेवर समकालीन इतर शैलींचा प्रभाव होता काय? वाकाटक शैलीचा वाकाटकोत्तर कालखंडात प्रभाव कसा आणि कितपत कायम राहिला? या सर्व प्रश्नांचा संक्षिप्त वेध खालीलप्रमाणे घेता येईल.
वाकाटक काळात स्थापत्य कला (लेणी व बांधीव मंदिरे), शिल्पकला, मृण्मयकला, कांस्य शिल्पकला, हस्तिदंत कला आणि चित्रकला इत्यादी कला प्रकार आढळतात. प्रारंभी शिल्पकलेच्या अनुषंगाने वाकाटक कलेचे परिशीलन केले आहे. शिल्पकलेच्या अनुषंगाने वाकाटक कलेचे दोन कालखंड दृग्गोचर होतात. वाकाटक काळातील कलेचा प्रारंभबिंदू म्हणून मांढळ (जि. नागपूर) येथील उत्खननात मिळालेल्या शिल्पांचा विचार करता येईल. या उत्खननात विविध देवदेवतांच्या प्रतिमा मिळाल्या. या प्रतिमा तत्कालीन प्राचीन भारताचा धार्मिक इतिहास आणि दख्खन मधील शिल्पकलेचा संपूर्ण इतिहास समजून घेण्यासाठी महत्त्वाच्या आहेत.

सूक्ष्म अभ्यासांती मांडलेल्या निरीक्षणानुसार असे लक्षात येते की, वाकाटक कलेची वैशिष्ट्ये स्थानिक प्रेरेणेतूनच वृद्धिंगत झालेली असावी. या प्रेरणात्मक भागाची पृष्ठभूमी अमरावती, नागार्जुनकोंडा (आंध्र प्रदेश), वनवासी, कनगनहल्ली (कर्नाटक) आणि तेर (महाराष्ट्र) इ. ठिकाणी उपलब्ध झालेल्या शिल्पांवरून स्पष्ट होते. सुबक ठेंगणा बांधा, विस्तीर्ण खांदे, काहीसी जाड शरीररचना, लंब गोलाकार चेहरा, उठावदार विस्तीर्ण भाल प्रदेश, ओठाचा खालील काहीसा समोर आलेला जाडसरभाग, ठळक रेखीव डोळे, काहीसे पसरट नाक, विविध प्रकारची केशरचना (विशेषत: अगदी प्रारंभिक काळापासून कुरळ्या केसांचा अतिशय कल्पक वापर केशरचना करताना शिल्पकारांनी केलेला दिसतो), जाडेभरडे अधोवस्त्र आणि उत्तरीय, ठळक आणि मोजकेच अलंकार, आयुधे इत्यादी. या शिल्पांच्या आधारावर हे ही लक्षात येते की, तत्कालीन यक्ष प्रतिमांचा या शिल्पकलेवर प्रभाव असावा. त्यासोबतच सातवाहन-ईश्वाकु कालखंडाच्या उत्तर काळात ब्राह्मण आणि बौद्ध धर्मात आमुलाग्र बदल घडून येत होता. या बदलांमुळे विविध प्रतिमांच्या निर्मितीसाठी पोषक प्रेरणात्मक पार्श्वभूमी तयार होत होती. त्याची परमावधी आणि परिणती वाकाटक शिल्पकलेत झालेली आढळते.
मांढळ येथे मिळालेल्या प्रतिमांत अष्टमुख शिव (?), द्वादशमुख शिव (सदाशिव ?), संकर्षण (बलराम), वासुदेव (विष्णू), पार्वती, नैगमेष, देवी (दुर्गा) आणि ब्रह्मा इ. शिल्पांचा समावेश आहे. मध्य भारतात गुप्त साम्राज्याचा विस्तार होत होता. याच काळात (कुषाण/उत्तर कुषाण) सुदूर उत्तरेत मथुरेच्या आसपास आणि त्या लगतच्या प्रदेशात शिल्पकलेच्या संदर्भात आमुलाग्र बदल घडून येत होते. विविध कल्पनांचा वापर या ठिकाणी होत होता. या बरोबरच, याहीपलीकडे गांधार प्रदेशात बौद्ध आणि ब्राह्मण धर्मांच्या प्रतिमा निर्मितीच्या संदर्भात वेगवेगळे प्रयोग होत होते. वरील तीन मुख्य ठिकाणी प्रयोगांशी काही अंशी स्पर्धा करेल अशा कल्पनांचा वापर वाकाटक शिल्पकलेत दिसतो. या प्रयोगांच्या आधारावरच वाकाटक शिल्पकलेची मानके तयार झालेली असावी. या शिल्पकलेचे संपूर्ण सौंदर्यशास्त्र स्थानिक असल्याचे या आधारावर स्पष्ट होते. कारण या शिल्पांशी तुलना करावी अशा प्रकारच्या शिल्पांचा पूर्ण अभाव या काळात दिसतो. या काळात तयार होत असलेल्या प्रतिमानिर्मितीवर प्रारंभिक काळातील वैष्णव आणि शैव धर्मांच्या संकल्पनांचा मोठा प्रभाव असल्याचे अभ्यासकांनी निदर्शनास आणले आहे.

वाकाटक कलेचा दुसरा आणि महत्त्वाचा कालखंड प्रवरसेन दुसरा याच्या काळात सुरू झाल्याचे दिसते. या काळातील शिल्पकलेचे नमुने रामटेक, पवनार, मनसर, भद्रावती, भटाळा, पातुर, हमलापुरी, नगरधन, अजिंठा, घटोत्कच आणि सालबर्डी (मध्य प्रदेश) इत्यादी ठिकाणी पाहायला मिळतात. या बदलांचे प्रतिबिंब त्यांच्या तत्कालीन ताम्रपत्रातील मजकुरावरसुद्धा पडल्याचे दिसते. या काळात वाकाटक शिल्पकला मोठ्या प्रमाणात कलेच्या दृष्टीने परिष्कृत झाल्याचे दिसते. आपल्या स्थानिक कलेचे सत्व न विसरता आवश्यक ते बदल या काळात केले गेले. या बदलावर याच काळात उत्तरेत आणि मध्य भारतात जे शिल्पकलेत बदल घडत होते, त्याचा प्रभाव स्पष्टपणे जाणवतो. विशेषत: शिल्पांची प्रमाणबद्धता, सुबक आणि रेखीव शरीर रचना. उदा., पवनार (जि. वर्धा) येथील गंगेची प्रतिमा, गोलाकार चेहरा, सुंदर रेखीव डोळे, तलम वस्त्राचे अंकन, किंचित वाढलेले परंतु, सुबक अलंकरण उदा. मनसर येथील वामनशिव (?) प्रतिमा इत्यादी. या काळात शिल्पांच्या विषयात सुद्धा वैविध्य आढळते. उदा., पवनार येथे खोदकामात मिळालेल्या रामायण आणि कृष्ण लीलांशी संबंधित शिल्पपट. या शिल्पांमध्ये त्या त्या देवतेच्या प्रकृतीधर्मानुसार त्यांचे दर्शन शिल्पकारांनी घडवल्याचे जाणवते. या काळातील शिल्पांमध्ये एक प्रकारचा राजस भाव प्रदर्शित होतो. त्यासोबतच देवदेवतांच्या शिल्प विषयांचे वैविध्य आणि कल्पकता पुरेपूर जपल्याचे दिसते. उपलब्ध प्रतिमांवरून शैव आणि वैष्णव संप्रदायाचे स्थान या काळात दृढ झाल्याचे स्पष्ट होते.
या काळातील शिल्पकलेच्या परमावधीचे मानबिंदू म्हणून काही शिल्पांचा निश्चितच उल्लेख करता येईल. उदा., रामटेक येथील केवल नृसिंह/रुद्र नृसिंह, मनसर येथील वामन शिव (?) आणि पवनार येथील गंगेची प्रतिमा. ही शिल्पे वाकाटक कलेची स्वयंसिद्ध वैशिष्ट्ये स्पष्ट करण्यास आणि समग्रपणे समजून घेण्यास पुरेशी आहेत. कलाइतिहास तज्ज्ञांनी या शिल्पांची प्रशंसा केलेली आहे. वरील उल्लेखित प्रतिमांत रामटेक येथील केवल नरसिंहाचे शिल्प वाकाटक राजवंशाच्या राजकीय प्रभाव आणि अस्तित्वाचे उत्कृष्ट उदाहरण ठरते.
वाकाटक काळातील शिल्पे ही मुख्यत: अग्निजन्य आणि वालुकाश्म या दोन प्रकारच्या दगडांत शिल्पांकित केली आहेत. माहुरझरी, पवनार, भोकरदन, मनसर, वाशीम आणि नगरधन आदी ठिकाणी उत्खननात उपलब्ध झालेल्या प्रतिमांत लज्जागौरी, नरसिंह, महिषासुरमर्दिनी, विष्णू, गणपती इ. देवतांच्या दगडाच्या प्रतिमा मिळाल्या आहेत. या सर्व प्रतिमा आकाराने जरी लहान असल्या, तरी शिल्पांकनाच्या दृष्टीने तत्कालीन आकाराने भव्य शिल्पांच्या प्रतिकृती वाटतात. या शिल्पांच्या आधारे प्रचलित लोकधर्मासोबतच शैव आणि वैष्णव संप्रदायाचा कसा प्रसार झाला, हे समजावून घेता येते.
अजिंठा येथील शैलगृहांमध्ये असेलेल्या शिल्पांतून बौद्ध धर्माशी संबंधित शिल्पकलेचा वाकाटक काळात कसा विकास झाला, याचे उत्कृष्ट दिग्दर्शन होते. येथील शिल्पकला वाकाटकांच्या वत्सगुल्म शाखेच्या साहाय्याने जरी विकसित झाली असली, तरीही तिचा नंदिवर्धन शाखेशी अन्योन्य संबंध आढळतो. उत्कृष्ट उठावात कोरलेली ही शिल्पे प्रमाणबद्धता, शरीर लय आणि बोलके भाव या वैशिष्ट्यांसाठी ओळखली जातात. अजिंठा येथील शिल्पकलेतून होणारे बुद्धाचे विलोभनीय दर्शन वाकाटक काळातील कलेचा परमोत्कर्ष म्हणून उल्लेख केला जातो. विशेषतः बुद्धाचे महापरिनिर्वाण शिल्प बुद्धाच्या महाकारुणिक अवस्थेचे अप्रतिम भावदर्शन म्हणून भारतीय कला क्षेत्रात उदाहरण दिले जाते. याठिकाणी असलेल्या शिल्पांची प्रमाणबद्धता ही तत्कालीन चित्रकलेशी साधर्म्य आणि संवाद साधणारी आहे, असे कलातज्ज्ञांनी अधोरेखित केले आहे.
या काळात शिल्पकलेची जी वैशिष्ट्ये वृद्धिंगत होत होती, त्या वैशिष्ट्यांचा प्रभाव आणि प्रसार वाकाटकांच्या प्रत्यक्ष अंमलाखाली असलेल्या प्रदेशासोबतच त्यांचे मांडलिक असलेल्या प्रदेशांतील शिल्पकलेवर पडलेले दिसते. उदा., कोकण मौर्य, कदंब, नल, पांडूवंशी, सोमवंशी इ.
वाकाटक सत्तेचा अस्त झाल्यानंतर दख्खनमध्ये वनवासीचे कदंब, बदामीचे चालुक्य, दक्षिण गुजरात, कोकण, माळवा आणि उत्तर महाराष्ट्रात महिष्मतीचे कलचुरी, दक्षिण कोसलमध्ये पांडूवंशी या राजवंशाच्या अखत्यारीत असलेल्या प्रदेशांत जे स्थापत्य आणि शिल्पकला निर्माण होत होती, या सर्वांवर वाकाटक कलेचा मोठा प्रभाव होता. पुढे राष्ट्रकुट काळात वाकाटक कलेच्या पार्श्वभूमीवर दख्खनमधील कलेचा विस्तार आणि प्रसार झाल्याचे दिसते.
वाकाटक काळात मृण्मय कलेचे स्वतंत्र स्थान होते. परंतु सातवाहन काळात मृण्मय कलेचे प्रयोग झाले, तसे वाकाटक काळात आढळत नाहीत. ज्या मोजक्या मृण्मय प्रतिमा पुरातत्त्वीय सर्वेक्षण आणि उत्खननांतून उपलब्ध झाल्या, त्यावरून या काळातील मृण्मय कलेचे आकलन करता येते. हाताने तद्वतच साच्यात तयार केलेल्या मृण्मय प्रतिमा या काळातील मिळतात. प्रतिमांचा विषय आणि त्यांची घडण यांवर तत्कालीन दगडी शिल्पकलेचा प्रभाव दिसतो. उपलब्ध मृण्मय प्रतिमांत विविध प्रकारचे प्राणी, लहान मुलांची खेळणी, अलंकार, शिक्के, शिक्क्यांचे छाप, गृह सजावटीच्या वस्तू, देवदेवतांच्या प्रतिमा मिळालेल्या आहेत. विशेषतः अलीकडेच मनसर, चंदनखेडा आणि नगरधन येथे झालेल्या उत्खननांतून वाकाटककालीन उत्कृष्ट मृण्मय प्रतिमा उपलब्ध झाल्या आहेत. चंदनखेडा (जि. चंद्रपूर) येथील उत्खननात आढळलेली मृण्मय प्रतिमा वैशिष्ट्यपूर्ण आहे. साच्यात तयार केलेली ही मृण्मय प्रतिमा मूळ स्वरूपात गोलाकार असावी. या प्रतिमेत दर्शनी बाजूस हलक्या उठावात स्त्री आणि पुरुष प्रतिमेचे अंकन असून ते गंधर्व युगल असावे. कारण या अंकनात आकाशस्थ विहरण्याचे प्रतिमांकन अतिशय जिवंतपणे केले आहे. या मृण्मय प्रतिमेवर तत्कालीन चित्रकला आणि शिल्पकलेचाही प्रभाव दिसतो.
वाकाटक काळातील कांस्य शिल्पांचे फार मोजकेच पुरावे उपलब्ध आहेत. या उपलब्ध पुराव्यांमध्ये हमलापुरी (जि. नागपूर) येथे खोदकामात मिळालेल्या कांस्य शिल्पांचा उल्लेख करता येईल. या बुद्ध प्रतिमा असून तत्कालीन कांस्य शिल्पात उत्कृष्ट प्रतिमा म्हणून गणल्या जातात. कांस्य धातूच्या ओतीव प्रकाराद्वारे या प्रतिमांची निर्मिती केली आहे. या कांस्य प्रतिमा सारनाथ (उत्तर प्रदेश) आणि नालंदा (बिहार) येथे प्राप्त झालेल्या कांस्य प्रतिमांशी कलात्मक साधर्म्य दर्शवितात.
वाकाटक काळात इतर कलेच्या प्रकारांमध्ये हस्तिदंतावरील कलाकुसरीच्या वस्तू, हाडांवरील कोरीव काम यांचा उल्लेख करता येईल. या वस्तूंचे प्रमाण तुलनेने फारच कमी आहे. उदा., कज्जलशलाका, सारीपाटच्या खेळातील सोंगट्या, केस विंचरण्याचा कंगवा, चाकू इत्यादी. परंतु कलात्मक दृष्ट्या विशेष उल्लेखनीय असे यांमध्ये आढळून येत नाही.
अशा प्रकारे प्रामुख्याने दोन मुख्य कालखंडात वाकाटक कलेचा विचार करता येतो. मांढळ हे प्रारंभिक काळातील, तर नंदिवर्धन (नगरधन), रामटेक, मनसर इ. ठिकाणी वाकाटक कलेच्या द्वितीय कालखंडातील शिल्पे उपलब्ध झाली. या दोन्ही कालखंडांच्या सूक्ष्म अवलोकनातून वाकाटक कलेचा अभिजाततेकडे झालेल्या प्रवासाचा समग्र अभ्यास करता येतो.
संदर्भ :
चित्रसंदर्भ : केवल नृसिंह शिल्प, रामटेक, जि. नागपूर (डॉ. अभिजित दांडेकर यांच्या सौजन्याने).
मूलस्थान-
वाकाटक घराणे मूळचे उत्तर भारतातील होते, असे काही पंडितांचे मत आहे. झाशी जिल्ह्यात 'बागाट' नावाचे एक गाव आहे. त्याचे मूळ नाव 'वाकाट' असावे आणि तेच वाकाटकांचे मूलस्थान असावे, असे अनुमान डॉ. काशीप्रसाद जायस्वाल यांनी केले आहे. पण ते सिद्ध करण्याजोगा कोणताही पुरावा अजून उपलब्ध झालेला नाही. शिवाय वाकाटकांचा एकही शिलालेख विंध्य पर्वताच्या उत्तरेला सापडलेला नाही.
कंकाली देवी मंदिर, तिगावा (जि. जबलपूर) 👇
वऱ्हांड्यातील छतावरील दंपती शिल्प, गुहा क्र. १६, अजिंठा 👇
वाकाटककांचे बहुतेक सर्व ताम्रपट विदर्भात सापडले आहेत. डॉ. वा. वि. मिराशी यांच्या मते वाकाटक घराणे मूळचे दक्षिण भारतातील होते. वाकाटक हे नाव असलेला सर्वात प्राचीन शिलालेख अमरावती जवळ असलेल्या एका स्तंभावर कोरलेला आहे. या लेखातील वाकाटक हे 'वंशनाम' नसून 'व्यक्तीनाम' आहे. त्यावरून आणि आणखी काही प्रमाणे देऊन हे घराणे दाक्षिणात्य होते, असे डॉ. मिराशी यांनी म्हटले आहे.
तथापि वाकाटकांचे मूळ स्थान कोणते हा प्रश्न अजूनही अनुत्तरीतच राहिला आहे. पण डॉ. पु. ग. सहस्त्रबुध्दे यांच्या मते, वाकाटक राजांची कर्मभूमी कोणती होती व ते कोणत्या प्रदेशांना साम्राज्याचे भाग मानीत, या गोष्टींना अधिक महत्व आहे आणि तेच खरे निकष आहेत.
शिलालेख आणि ताम्रपटांच्या आधारे हे सिद्ध झाले आहे की, वाकाटकांच्या राज्याची स्थापना सर्वप्रथम विदर्भात झाली.
रामटेक जवळची 'नंदीवर्धन' ही त्यांची पहिली राजधानी होती तर 'वत्सगुल्म' व 'प्रवरपूर' (पवनार) ह्या नंतरच्या राजधान्या होत्या.
वाकाटकांचे मूळ राज्य नागपूर, विदर्भ, कुंतल, अश्मक व मूलक या महाराष्ट्रातील प्रदेशांवर होते आणि त्यांचे साम्राज्य माळवा, कोसल, लाट, कलिंग व आंध्र ह्या प्रदेशांवर होते.
वाकाटकांचे बहुतेक कोरीव लेख, त्यांनी बांधलेली मंदिरे व त्यांच्या राजवटीतील लेण्या महाराष्ट्रातच आहेत. त्यांनी महाराष्ट्री प्राकृत भाषेला आश्रय देऊन त्या भाषेत स्वतः काव्यरचनाही केली. महाराष्ट्र हीच त्यांची कर्मभूमी होती. यावरून हे घराणे महाराष्ट्रीय होते, हे दिसून येते.
विंध्यशक्ती पहिला (इ.स. २५० ते २७०)-
'वाकाटक' वंशातला हा पहिला राजा सातवाहनांचा मोठा अधिकारी असावा आणि सातवाहनांची सत्ता क्षीण झाल्यानंतर त्याने विदर्भात स्वतंत्र राज्य स्थापन केले असावे, असे म. म. मिराशींचे अनुमान आहे. पुराणातील वर्णनावरून तो विदिशेचा असावा, असेही अनुमान निघते. पण मिराशींच्या मते ते बरोबर नाही.
अजिंठा येथील लेखात विंध्यशक्तीच्या पराक्रमाचे खूप वर्णन केलेले असून त्याला 'वाकाटकवंशकेतू' म्हटले आहे.
काही विद्वानांच्या मते, त्याचे खरे नाव वेगळेच असून विंध्यपर्वतापर्यंत आपल्या सत्तेचा विस्तार केल्यानंतर त्याचे द्योतक म्हणून त्याने 'विंध्यशक्ती' हे बिरूद धारण केले होते. पण पुराणातील वर्णनावरून हा विस्तार त्याच्या पुत्राच्या वेळी झाला, असे दिसते. वाकाटकांच्या दानपत्रात विंध्यशक्तीचे नाव नाही. त्यातील वंशावळ प्रथम प्रवरसेनापासून सुरू होते, कारण तोच साम्राज्य संस्थापक होता.
प्रवरसेन पहिला (इ स २७० ते ३३०)-
विंध्यशक्तीच्या नंतर त्याचा पुत्र प्रवरसेन गादीवर बसला. पुराणात त्याला 'प्रवीर' म्हटले आहे. तो या वंशातील सर्वश्रेष्ठ नृपती होता. त्याने नर्मदेपर्यंत स्वारी करून 'पुरिका' ही नगरी जिंकली. ही नगरी सातपुडा पर्वताच्या पायथ्याशी होती, असे हरिवंशात म्हटले आहे. पूर्वेकडील दक्षिण कोसल, कलिंग, आंध्र आणि दक्षिणेकडील उत्तर कुंतल या प्रदेशांतील लहान-लहान राज्यांनी प्रवरसेनाचे वर्चस्व मान्य केले असावे. 'पुरिका' ही त्याची राजधानी होती.
प्रवरसेन हा वैदिक धर्माचा पुरस्कर्ता होता. त्याच्या वंशजांच्या बहुतेक सर्व ताम्रपटात त्याने केलेल्या चार अश्वमेधांचा व सात सोम यागांचा उल्लेख आढळतो. त्याने 'धर्म महाराज' व 'सम्राट' या पदव्या धारण केल्या होत्या.
आपल्या साम्राज्याला बळकटी आणण्यासाठी प्रवरसेनाने नागवंशी भारशिवांशी वैवाहिक संबंध जोडला. भारशिव नृपती भगनाग याने आपली कन्या प्रवरसेनाचा ज्येष्ठ पुत्र गौतमीपुत्र याला दिली.
प्रवरसेनाला चार पुत्र होते. ते सर्व राजे झाले. वाशीम येथील ताम्रपटात सर्वसेन याचा उल्लेख आलेला आहे. गौतमीपुत्र अगोदरच निधन पावला होता. त्याचा पुत्र रूद्रसेन हा प्रवरसेनानंतर गादीवर बसला. तो कदाचित 'पुरिका' येथून राज्य करीत असावा किंवा त्याने आपली राजधानी नंदीवर्धन (नगरधन) येथे नेली असावी. त्याची सत्ता उत्तर विदर्भावर होती. दुसरा पुत्र सर्वसेन याचे राज्य दक्षिण विदर्भावर होते. त्याची राजधानी वत्सगुल्म (वाशीम) होती. इतर दोन पुत्रांची माहिती उपलब्ध नाही.
'हरिषेण' हा वत्सगुल्म शाखेचा शेवटचा ज्ञात राजा होय. त्याच्यानंतर एक-दोन राजे होऊन गेले असावे, पण त्यांची नावे माहीत नाहीत. इ स ५५० च्या सुमारास माहीष्मतीच्या 'कलचुरी' राजाने विदर्भात राज्य स्थापन केले, असे दिसते. त्यावरून हरिषेणानंतर लवकरच वाकाटकांचे राज्य नाश पावले असावे.
'वाकाटक' हे अत्यंत शांतता प्रिय राजे होते. वाकाटकांच्या काळात विदर्भाची अत्यंत भरभराट झाली होती.
त्यांचे साम्राज्य उत्तरेत माळव्यापासून दक्षिणेत तुंगभद्रेच्या खोऱ्यापर्यंत आणि पश्चिम समुद्रापासून बंगालच्या उपसागरापर्यंत पसरले होते.
त्यांचे राज्यशासन कार्यक्षम होतेच शिवाय राज्यात सर्वत्र शांतता, सुव्यवस्था आणि समृद्धी नांदत होती. त्यांनी न्यायाने राज्यकारभार चालवला आणि विदर्भाचे नाव उज्ज्वल केले! म्हणून त्या काळाला विदर्भाच्या प्राचीन इतिहासातील सुवर्णयुग म्हणता येईल.
त्याकाळात विदर्भात संस्कृत आणि प्राकृत वाङ्मय, कला कौशल्य व व्यापार यांना उत्तेजन मिळून विदर्भाची कीर्ती सर्वदूर पसरली होती. (उदा. कालिदास लिखित 'मेघदूत')
वाकाटक राजांनी धर्म, विद्या व कला यांना उदार आश्रय दिल्यामुळे त्यांचा अभूतपूर्व विकास झाला. त्यांनी अनेक मंदिरे बांधली. तसेच अनेक यज्ञ केले आणि पौराणिक धर्माचाही पुरस्कार केला.
विविध प्राण्यांचा शिल्पपट्ट, गुहा क्र. १७, अजिंठा 👇
'वाकाटक' घराण्याचे वैशिष्ट्य म्हणजे या घराण्यातील राजे, महाराजे यांनी केलेल्या कामांचे अनेक शिलालेख आणि ताम्रपट बनवले. विदर्भातच नव्हे तर विदर्भाच्या बाहेरही शेतात माती खोदताना किंवा घराच्या बांधकामासाठी पाया खोदताना वाकाटकांचे ताम्रपट नागरिकांना सापडले आहेत. अजिंठ्याच्या लेण्यांमधील शिलालेखातही वाकाटकांची बरीच माहिती आहे. त्यामुळे वाकाटकांचा बराच इतिहास समोर आला आहे.
चित्रस्त्रोत: मराठी विश्वकोश
संदर्भ व माहितीस्रोत:
१. भारतीय संस्कृतिकोश खंड ८
२. मराठी विश्वकोश
वाकाटक घराणे :-
वाकाटक म्हणजे महाराष्ट्रातील एक प्राचीन प्रसिद्ध राजवंश…!.
या वंशाची माहिती पुराणे, शिलालेख व तांम्रपट यांतून मिळते. प्राचीन काळी भारतात जी अत्यंत बलाढ्य व समृद्ध अशी साम्राज्ये अस्तित्वात आली, त्यांमध्ये वाकाटक साम्राज्याचा अंतर्भाव होतो. या राजघराण्याचा मूळ पुरुष वाकाटक हा इ.स. २००च्या सुमारास होऊन गेला. त्याचा एक त्रुटित लेख आंध्र प्रदेशातील अमरावती स्तूपाजवळ एका अष्टकोनी स्तंभखंडावर कोरला आहे. त्यात त्याने तेथे केलेल्या दानाचा उल्लेख आहे. हा वाकाटक गृहपती (गृहस्थ) जवळच्या प्रदेशातून (बहुधा पूर्वीच्या हैदराबाद संस्थानच्या दक्षिण भागातून) यात्रेकरिता तेथे गेला असावा.
राज्य संस्थापक - विंध्यशक्ती
अजिंठ्याच्या सोळा क्रमांकाच्या लेण्यात या घराण्यातील पहिला राजपुरुष विंध्यशक्ती याला ‘द्विज’ म्हटले आहे, त्यावरून हे घराणे ब्राह्मण होते असे दिसते. त्याच्या विष्णुवृद्ध गोत्राचा निर्देश वाकाटकांच्या अनेक ताम्रपटांत येतो. विंध्यशक्ती आरंभी सातवाहनांचा मांडलिक असावा पण सन २५०च्या सुमारास योग्य संधी साधून त्याने आपले स्वतंत्र राज्य स्थापले असे दिसते. हा आणि त्याचा मुलगा पहिला प्रवरसेन यांचा नामनिर्देश पुराणात आला आहे.
प्रवरसेन हा महापराक्रमी निघाला. त्याने अनेक देश जिंकून चारी दिशांत आपले राज्य पसरविले. त्याने अनेक सोमयाक, वाजपेय आणि चार अश्वमेध करून सम्राट ही पदवी धारण केली. ऐतिहासिक काळात दक्षिण किंवा उत्तर भारतात ही पदवी दुसऱ्या कोणी राजाने धारण केलेली माहीत नाही.
वाकाटक राज वैभव
वाकाटकांचा काळ त्यांनी धर्म, विद्या व कला-कौशल्य यांस दिलेल्या उदार आश्रयाबद्दल प्रसिद्ध आहे. बहुतेक वाकाटक राजे शिवोपासक होते पण प्रभावती – गुप्तेच्या प्रभावामुळे तिचा पती द्वितीय रुद्रसेन विष्णूचा उपासक झाला. वाकाटकांनी अनेक मंदिरे बांधली व त्यांना शिल्पादिकांनी विभूषित केले. त्यांचे उल्लेख कोरीव लेखांत येतात. त्यांच्या काळात राजधानीजवळच्या नंदीवर्धन ( नगरधन - रामगिरी) (रामटेक-नागपूर) येथील देवालयांना फार महत्त्व प्राप्त झाले होते. प्रभावती-गुप्तेचे दोन ताम्रपट तेथून दिले होते.
त्यांतील एकात रामगिरिस्वामीच्या (भगवान रामचंद्राच्या) पादुकांचा उल्लेख आहे.
पुढे या राज्याची विभागणी झाली तेव्हा दुसरी राजधानी ‘वत्सगुल्म’ म्हणजे सध्याचे वाशिम (जिल्हा वाशिम) येथे वसविण्यात आली.
स्रोत :
वाकाटक राजा प्रवरसेन (दुसरा) ह्याने ५व्या शतकात महाराष्ट्रीय प्राकृत भाषेत रावणवहो नामक काव्याची रचना केली असे मानले जाते. रावणवहोचा मराठीत अर्थ 'रावणवध' असा होतो. ह्या काव्यरचनेस सेतुबंध असेही नाव आहे.
वत्सगुल्म (आजचे वाशिम) ही वाकाटकांची राजधानी होय. नागपूरच्या रामटेक तालुक्यात मानसर येथे उत्खननात सापडलेले ५व्या शतकातील प्राचीन प्रवरेश्वर शिव मंदिरही प्रवरसेन दुसरा ह्याने बांधलेले मानले जाते.
मानसर येथील मंदिराचे अवशेष
प्रवरेश्वर शिवलिंग
▲ बाघ येथील गुंफा क्रमांक ४ च्या मुखमंडपातील चित्राचा काही भाग
कोसल, मेकल आणि अवंति येथील राजे नंदिवर्धन शाखेचा राजा नरेंद्रसेन याची आज्ञा शिरसावंद्य मानीत असत. त्याचा पुत्र द्वितीय पृथ्वीषेण याच्या काळातही तीच परिस्थिती चालू असावी हे नचणा आणि गंज येथील उच्चकल्प वंशातील राजे स्वतःचे वर्णन 'श्रीपृथ्वीषेण पादानुध्यात्' असे करतात, त्यावरूनही स्पष्टपणे लक्षात येते. या दोघांचा काळ इ. स. सुमारे ४४० ते इ.स. ४७० इतका मानावयास हरकत नाही, हे वर्चस्व नंतरच्या पिढीत प्रतापी हरिषेणाच्या काळातही चालू राहिले, याची ग्वाही वराहदेव आपल्या अजिंठा येथील गुंफा क्रमांक १६ च्या शिलालेख देतो. हरिषेणाचा काळ म. म. मिराशी स्थूलपणे इ. स. ४७५ ते इ.स. ५०० असा मानतात. डॉ. स्पिक यांनी वाकाटक वंशावळीचा अधिक सूक्ष्मपणे विचार केला आणि त्यातल्या त्यात अजिंठा येथील गुंफांच्या संदर्भात अधिक खोलात जाऊन विचार केला. त्यांच्या मते हरिषेण आणि त्याचा मुलगा यांचा काल इ.स. ४९०च्या पलीकडे ताणणे योग्य ठरणार नाही. ते हरिषेणाचा काळ इ. स. ४६२ ते इ. स.४७८ एवढाच मानतात. त्यासंदर्भात हेही लक्षात ठेवले पाहिजे की, त्यांच्या मते अजिंठा येथील दुसऱ्या टप्प्यातील म्हणजे सातवाहनांच्या नंतरच्या काळातील व वत्सगुल्म नृप आणि त्यांचे मांडलिक यांच्या काळातील, अजिंठा आणि घटोत्कच येथील गुंफा कोरण्याचे मुख्य काम हे सोळा वर्षांच्या आतच संपले असावे. त्यासाठीची त्यांची कारणमीमांसासुद्धा स्थापत्यशास्त्रातील निरनिराळ्या अंगांना स्पर्श करून जाते. त्यांच्या मते गुंफा खोदण्याचे काम हे पुरातत्त्वातील खड्डा खोदण्याइतकेच कालनिश्चितीच्या संदर्भात महत्त्वाचे आहे. ज्या वेळी एखादा उत्खनक जमिनीच्या पृष्ठभागापासून खड्ड्याच्या तळापर्यंत खोदत जातो, त्या वेळी तो वर्तमानातून भूतकाळात प्रवेश करत असतो. म्हणजे सगळ्यात वरचे थर हे सर्वात अर्वाचीन असतात तर शेवटचा थर हा सगळ्यात जुना असतो. डॉ. स्पिक यांच्या मते जेव्हा आपण एखादी गुंफा खोदत आत जातो, त्यावेळी गुंफेचा बाहेरचा मंडप, त्यानंतर आतले सभागृह व त्यापाठी असलेले गर्भगृह अशी विहाराची रचना लक्षात घेतली तर बाहेरचा मंडप हा सगळ्यात जुना असतो तर गर्भगृहातील प्रतिमा किंवा स्तूप हा सगळ्यात शेवटी खोदलेला भाग म्हणजे सर्वात अर्वाचीन असतो.
▲ बाघ गुंफा क्रमांक २ मधील बुद्धमूर्ती
सर्वसामान्यपणे एखादी गुंफा एकाच टप्प्यात खोदलेली असते, अशी समजूत असल्याने ती गुहा खोदायला वीसेक वर्षे लागली तरी त्या गुहेचा काल एकच आहे असे गृहीत धरून विद्वान पुढे विवेचन करतात. अजिंठा व घटोत्कच येथील गुंफा या सामान्य परिभाषेत बोलायचे झाल्यास महायानपंथीय गुंफा, कोरण्यास सुमारे दीडशे वर्षे लागली असावी असा अंदाज जेम्स बर्गेस आणि जेम्स फर्ग्युसन यांनी व्यक्त केला होता, पण हरिषेणाचे साम्राज्य, त्याचे घटक असलेली राज्ये, राज्यकर्ते, मांडलिक राजवंश आणि त्या त्या राज्यांमध्ये झालेली सत्तांतरे लक्षात घेतली तर अजिंठा येथील गुंफांचा काल हा अधिक नेटकेपणाने मांडता येईल, असा अंदाज डॉ. स्पिक यांनी मांडला. सुरुवातीस हरिषेणाचा काळ त्यांनी या विषयाचे संशोधन सर्व समावेशकपणे करून ठामपणाने मांडणाऱ्या म. म. मिराशीप्रमाणेच इ. स. ४७५ ते इ. स. ५०० असा गृहीत धरला होता. पण उत्तरेतील कुमारगुप्त (इ. स. ४१५ ते इ. स. ४५५) व स्कंदगुप्त (इ. स. ४५५ ते इ. स. ४६८) यांच्यानंतर निर्माण झालेली राजकीय अस्थिरता लक्षात घेता, वाकाटकांनी गुप्त साम्राज्यातील काही भागावर आपले स्थान बळकट केले असावे, असे लक्षात आले. आणि हरिषेणानंतर अंध, मेकल, कोसल, लाट हे त्याच्या प्रभावाखालील मंडलिकांचे प्रदेश हे स्वतंत्रपणाने राज्य करू लागले हेही लक्षात आले. कोसल आणि मेकल येथे, तसेच कोकणातही इ. स. ४९० नंतर वाकाटकांचे वर्चस्व संपुष्टात आले, हे परिव्राजक, उच्चकल्प आणि त्रैकूटक राजांच्या अभिलेखांवरून लक्षात आले.
(बाघ गुंफा छायाचित्र सौजन्य rangasai.blogspot.in)
तीच गोष्ट माळव्यातही झाली असावी असे वाटते. माहिष्मती येथून राज्य करणाऱ्या महाराज सुबंधु याचा ताम्रपट धारपासून सुमारे तीस मैलांवर असलेल्या बाघ येथील बौद्ध गुंफांमध्ये सापडला. त्यात कुठल्या संवत्सरी हा ताम्रपट दिला हे स्पष्ट केले असले तरी, तो गुप्त की कलचुरी संवतामध्ये दिला हे स्पष्ट केले नसल्यामुळे संशोधकांमध्ये त्यावरून दोन पक्ष निर्माण झाले. म. म. मिराशींच्या मते तो कलचुरी-चेदी संवतामध्ये दिला असल्याने त्याचा काल इ. स. ४१३ ठरत होता, तर तो गुप्त संवतामध्ये असल्यास इ. स. ४८४ मध्ये दिला होता असा होतो. या मतभेदामुळे, बाघ येथील गुंफा या पाचव्या शतकाच्या दुसऱ्या दशकात की सातव्या शतकात पूर्ण झाल्या याविषयीची चर्चा सुरू झाली. डॉ. कार्ल खंडालवाला यांनी बाघ गुंफांतील भित्तिचित्रांच्या शैलीवरूनही त्या गुंफा पाचव्या शतकाच्या दुसऱ्या दशकात झाल्या असाव्यात हे ठामपणे सांगितले, म. म. मिराशींच्या मताला दुजोरा दिला. म. म. मिराशींनी महाराज सुबंधुचा ताम्रपट हा पूर्वीचा असावा, असे मांडण्याचे कारणही साहजिकच होते. कारण तो जर पाचव्या शतकातील आठव्या दशकात झाला असे मानले तर पृथ्वीषेण द्वितीय आणि हरिषेण यांचे माळवा प्रदेशावर वर्चस्व होते, या अभिलेखीय पुराव्याच्या ते विरुद्ध गेले असते.
▲ बाघ येथील गुंफा क्रमांक २ मधील एकपाषाणीय स्तूप
या पार्श्वभूमीवर डॉ. वाल्टर स्पिक यांचे संशोधन महत्त्वाचे आहे. बाघ येथील गुंफा या सर अलेक्झांडर कनिंगहॅम यांनी केलेल्या सर्वेक्षणाच्या अगोदरपासून इंग्रज विद्वानांना माहीत होत्या. इम्पे यांनी १८५४ साली बॉम्बे बँच ऑफ द रॉयल एशियाटिक सोसायटीच्या संशोधन पत्रिकेत बाघ गुंफांवर एक निबंध प्रसिद्ध केला होता. बाघनी नदीच्या किनाऱ्यावरील वालुकाश्माच्या टेकडीमध्ये या दहा गुंफा कोरलेल्या आहेत. वालुकाश्म हा दगडाचा प्रकार मऊ असल्यामुळे जर चांगल्या पोताचा (Fine Grain) असला तर बांधकामाबरोबरच शिल्पामध्येसुद्धा काम करण्यासाठी उत्कृष्ट समजला जातो. याचे उत्तम उदाहरण खजुराहो येथील मंदिरे. येथील जवळजवळ ११० फूट उंची असलेली मंदिरे आजही भक्कमपणे उभी आहेत आणि शिल्पांचे सौदर्यसुद्धा अप्रतिम आहे, पण बाघ येथील खडकामध्ये वालुकाश्माचे थर वेगवेगळे दिसतात. एवढेच नाही तर तळाशी मातीइतकाच ठिसूळ असा एक थर आहे. त्यामुळे काही गुंफांतील छताचे एक-दोन थर कोसळल्यामुळे छताचा काही भाग स्थिर करण्यासाठी अधिक वर जाऊन कारागिरी करावी लागली. डॉ. स्पिक यांनी वर्णन केल्याप्रमाणे काही ठिकाणचे खांब किंवा मूर्ती कोरीवकाम चालू असतानाच भंग पावल्यामुळे सुटे स्तंभकिंवा सुट सुट्या मूर्ती कोरून, त्या जमिनीवर छिद्रे करून बसवाव्या लागल्या. गुंफा दहा असल्या तरी गेल्या ११०० ते १२०० वर्षांत अनेक ठिकाणी मोठ्या प्रमाणावर पडझड झाल्याने फर्ग्युसन यांचे वर्णन बाघ येथील चार गुंफांच्या वर जात नाही. येथील भित्तिचित्रांना इतका धोका निर्माण झाला की ती चित्रे हलवून सुरक्षित ठिकाणी ठेवावी लागली. एवढे असूनही कलासमीक्षेस वाहिलेल्या सुप्रसिद्ध 'मार्ग' या नियतकालिकाचा बाघ येथील स्थापत्यशिल्प आणि चित्रकला यांवर एक विशेषांक काढण्यात आला. प्राध्यापक मीना तालीम यांनी आधुनिक चित्रकारांनी केलेल्या बाघ येथील चित्रांच्या केलेल्या नकलांच्या साहाय्याने बाघ येथे कुठली जातके रंगवली असावीत यावर एक स्वतंत्र ग्रंथच प्रकाशित केला आहे. मोनिका झिन यांनी ईस्ट अँड वेस्ट (खंड ५१, २००१, पृष्ठे २९९ ते ३२२) या आंतरराष्ट्रीय नियतकालिकात एक निबंध प्रसिद्ध केला. त्यांनी गुंफा क्रमांक चार आणि पाच यांना सामाईक असलेल्या मुखमंडपाच्या मागल्या भिंतीवरील जवळजवळ ४० फूट लांब भागावर पसरलेल्या या मोठ्या चित्राचा आशय आपल्या सूक्ष्म संशोधनाच्या साहाय्याने मांधाता या चक्रवर्तीच्या जीवनातील स्वर्गक्रमाचा आहे असे सिद्ध केले. डॉ. स्पिक यांनी स्थापत्य, शिल्पकला व मूर्तिविज्ञान आणि त्यातील संकेत यांच्या साहाय्याने गुंफा क्रमांक ४, ६, ७ व इतर काही गुंफांतील भगवान बुद्धाची मुख्य मूर्ती आणि तिच्या दोहो बाजूस कोरलेल्या बुद्ध परिवारातील इतर बुद्धमूर्ती यांच्यातील साम्य ठळकपणे दाखवले आहे. त्यांनी मोठ्या बारकाईने चौकोनी तळखडा व शीर्षभाग असलेल्या स्तंभांच्या मधल्या भागावर सरळ किंवा तिरप्या जाणाऱ्या पन्हाळीच्या अलंकरणातील आणि अजिंठा येथील त्यासारख्या दिसणाऱ्या, त्यातल्या त्यात अजिंठा येथील गुंफा क्रमांक १, २ व घटोत्कच येथील स्तंभांचे स्थापत्यदृष्ट्या ठळकपणे दिसणारे साम्य लक्षात आणून दिले आहे. अजिंठा येथील विहार आणि चैत्य यांच्या आसपास असणाऱ्या नागप्रतिमांचे आणि देवकुलिकांचे सूचक अस्तित्वसुद्धा आपल्या लक्षात आणून दिले आहे. घटोत्कच येथे शासनाच्या पुरातत्त्व व वस्तुसंग्रहालयाने हाती घेतलेल्या उत्खननात एक मोठी नागराजाची प्रतिमा तीन-चार वर्षांपूर्वी सापडली हे या संदर्भात अत्यंत महत्त्वाचे आहे. आणखी एक महत्त्वाचा स्थापत्यविशेष म्हणजे बाघ व अजिंठा येथील विहारांच्या तलविन्यासात असलेले विलक्षण साम्य, उदाहरणार्थ, दोन्ही स्थळी विहाराच्या सुरुवातीस आडवा मुखमंडप त्याच्या दोन्ही अंगांना, समोर दोन स्तंभ असलेले दोन कक्ष, आतील सभागृहाच्या उजव्या डाव्या बाजूला आठ किंवा नऊ कक्ष, मागल्या भिंतीत कक्ष किंवा यक्षप्रतिमांसाठी असलेल्या देवळ्या व मध्यभागी गर्भगृह अशी मांडणी आहे. या तलविन्यासातील साम्याबरोबरच एक कळीचा मुद्दा डॉ. रिंथक यांनी असा मांडला आहे की, एरवीच्या बुद्धमूर्तीच्या शेजारील बोधिसत्त्वप्रतिमांच्या ऐवजी आता चार किंवा सहा बुद्ध हे मूर्तीभोवती परिवारात दिसतात. तसेच आणखी एक वेगळी प्रक्रिया घडताना या ठिकाणी दिसते, ती म्हणजे गर्भगृहात बाघ येथे स्तूपच आढळतात; परंतु त्याऐवजी देवकुलिकांमध्ये स्तूपाऐवजी बुद्धप्रतिमा आढळते. ही प्रक्रिया अजिंठा येथेसुद्धा अवलंबिली आहे, हे गुंफा क्रमांक १९, २६ यातील स्तूपासमोर कोरलेल्या बुद्धमूर्तीवरून लक्षात येते, तर गुंफा क्रमांक ११ मध्ये प्रदक्षिणा घालता येईल असा स्तूप होता. त्याऐवजी पार्श्वभागात फक्त बुद्धमूर्तीच दिसते. डॉ. स्पिक यांनी निवासकक्षामध्ये लाकडी दरवाजे दगडी चौकटीत कसे बसवायचे यांचा अभ्यास करून अजिंठा येथे चार प्रकारच्या लाकडी चौकटी होत्या असे दाखवून दिले आहे. त्यातील काही चौकटीची ठेवण ही बाघ येथील चौकटीशी साम्य दाखवते, त्यामुळे त्या बाघ येथील चौकटींच्या समकालीन असाव्यात असे दाखवून दिले आहे.
▲ बाघ येथील एका गुंफेचा दर्शनी भाग
वरील सर्व ऊहापोहावरून लक्षात येईल की, डॉ. स्पिंक यांना अजिंठा येथील गुंफा या मुख्यत्वे सोळा वर्षांतच घडवल्या गेल्या हे मांडण्यासाठी प्रत्येक गुंफेतील स्थापत्यघटक त्यांच्या तुलनात्मक अभ्यासातून कालनिर्णयासाठी अनेक बारीक तपशिलांचा अभ्यास करावा लागला. या सर्व गोष्टींचा विचार केल्यानंतर अभ्यासक बाघ येथील गुंफा या पाचव्या शतकाच्या आठव्या दशकात निर्माण झाल्या असाव्यात या निष्कर्षाला येऊन पोहोचतो. आणि त्यामुळे अजिंठा आणि बाघ यातील साम्य लक्षात घेऊन अजिंठा येथील एकूण कालखंडाचा विचार करताना मध्ये काही काळपर्यंत, म्हणजे डॉ. स्पिंक सुचवतात त्याप्रमाणे, इ. स. ४७२ ते ४७६ या काळात अजिंठा येथील कामात खंड पडल्याने तेथील स्थपती व कलाकार यांनी बाघ येथील या गुंफा रचल्या या त्यांच्या प्रमेयाचा गंभीरपणे विचार करणे भाग आहे.
▲ बाघ येथील गुंफा क्रमांक ४ च्या बाहेरील बाजूची नागराजाची प्रतिमा
माळव्यातील बाघ येथील गुंफांप्रमाणेच बु-हाणपूरजवळ फोफनार येथे सापडलेल्या सात कांस्यमूर्तीचा विचार करणे भाग आहे. या सर्व बुद्धमूर्ती साधारणपणाने एकाच ठेवणीतील आहेत. त्याखाली जाळीची नक्षी असलेल्या चौथऱ्यावरील साध्या पीठावर उभ्या असून उजवा हात अभयमुद्रेत आणि डाव्या हातात, उपरण्याप्रमाणे उजव्या खांद्यावर ठेवून पांघरलेल्या संघाटीचे (एक प्रकारचे वस्त्र) दुसरे टोक आहे. चेहऱ्याची रचना, लंबाकार कान, वर कुरळे केस आणि उष्णीष (बुद्धांच्या मस्तकावर महापुरुषाचे लक्षण दर्शविणारा उंचवटा) यामुळे समान असले तरी गाल, डोळे आणि नाक यांच्या ठेवणीत फरक आहे. काही अगदी निखळ गुप्त शैलीतील उभट चेहऱ्याच्या असून काही मूर्तीमध्ये चेहरा चौकोनी व गाल फुगीर आहेत. दुसरे एक समान वैशिष्ट्य म्हणजे सिरपूर येथील बौद्ध आणि जैन मूर्तीप्रमाणे काळ्या बुब्बुळाभोवतीचा भाग चांदीचा पातळ थर देऊन पांढरा केला आहे. संघाटी आणि अधोवस्त्र हे सारनाथ येथल्याप्रमाणे झिरझिरीत दाखवले असले तरी कमरेखालील भागावर त्रिपुंड्राच्या आकाराच्या घड्या एकाखाली एक दिसतात. सारनाथ येथील मूर्तीत वक्षस्थळापासून खालपर्यंत अर्धचंद्राकृती चुण्या पडलेल्या दिसतात. यातील एक मूर्ती अत्यंत सुंदर असून पीठावर पूर्ण विकसित अशा कमळाच्या गाभ्यावर भगवान बुद्ध उभा असून, त्याच्यावर दोन मालाधारी शिशू गंधर्वांनी छत्र धरले आहे. ती बुद्धमूर्ती सर्वात सुबक आणि देखणी असून या ध्यानाच्या बुद्धाचे चित्रण अजिंठा येथील क्रमांक १० च्या गुंफेतील बाजूच्या खांबांवर आढळून येते. प्राचीन फोफनार हे नर्मदा नदीच्या उत्तर किनाऱ्यावरील व माळव्याच्या दक्षिणेस असलेल्या प्राचीन अनुप देशातील एक नगर असावे. माळव्यावर अधिकार गाजवणाऱ्या हरिषेणाचा या भागावरसुद्धा अंमल असावा, हे साहजिकच आहे. महाराष्ट्र पुरातत्त्व विभागाचे सहायक संचालक (कै.) चेतन साळी यांना तापीकाठी सापडलेल्या पक्क्या मातीच्या बुद्धमूर्तीचा उल्लेख केल्याशिवाय हे विवेचन पूर्ण होणार नाही. त्यांनी या बुद्धमूर्तीचे छायाचित्र असलेला आपला लेख 'मार्ग' या नियतकालिकात प्रसिद्ध केला. सिंहासनावर बसलेली ही छोटीशी बुद्धमूर्ती अजिंठ्यातील बुद्धमूर्तीपेक्षा सारनाथ येथील बैठ्या बुद्धमूर्तीला अधिक जवळची आहे. यावरून सहज लक्षात येते की, मथुरेपासून माळव्यामार्गे येणारा मार्ग नर्मदा व तापी ओलांडून (म्हणजे आजच्या बुऱ्हाणपूरमार्गे) अजिंठ्यास पोहोचत होता. आणि त्यामुळे आर्थिक आणि सांस्कृतिक देवाणघेवाण या सर्व प्रदेशांतून होत होती, हे लक्षात येते. अजिंठा येथील गुंफा क्रमांक चारचा आश्रयदाता हा इतर गुंफांच्या आश्रयदात्याप्रमाणे मांडलिक किंवा दरबारी नसून एक श्रेष्ठी होता. त्याचे नाव माथुरक, म्हणजे तो मथुरेचा होता, हेसुद्धा हीच बाब अधोरेखित करते. फोफनार येथील बुद्धमूर्तीप्रमाणे संघाटीचे चित्रण असलेल्या बुद्धमूर्ती अजिंठा येथील अगदी शेवटच्या कालखंडात ज्याला, इंटुजिव्ह फेज असे डॉ. स्पिंक यांनी यथार्थ अभिधान दिले आहे, त्या फोफनारच्या बुद्धमूर्तीशी साम्य दाखवतात यावरूनसुद्धा या अत्यंत गुंतागुंतीच्या परस्परसंबंधांवर प्रकाश टाकतात. नेपोलिअन असे त्याचे वर्णन केले
नंदिवर्धन शाखेचा महाराज प्रवरसेन द्वितीय हा वाकाटक वंशातील एक अद्वितीय राजा होता यात शंका नाही. गुप्तवंशातील विक्रमादित्य चंद्रगुप्त (इ.स. ३६५ ते इ.स. ४१५) याचा तो प्रस्थापित केली. क्वचितच एखाद्या नातू, याने जवळजवळ ३० वर्ष राज्य केले (इ.स. सुमारे ४१० ते ४४०). आपल्या पूर्वजांपेक्षा कितीतरी मोठ्या प्रदेशावर त्याने आपली सत्ता राजाने ताम्रपट इतक्या मोठ्या संख्येने वितरित केले असतील. पंधरापेक्षा जास्त ताम्रपट आज त्याच्या नावावर आहेत. विदर्भाच्या पूर्वेस म्हणजे आजच्या छत्तीसगढ भागात, आणि नर्मदेच्या पलीकडे उत्तरेत आणि पश्चिमेस गोदावरीच्या तीरापर्यंत त्याचा अंमल होता. यापूर्वी उल्लेखिल्याप्रमाणे कदाचित दुसऱ्या वाकाटक शाखेच्या अमलाखालील प्रदेशावरही अप्रत्यक्षपणे त्याचा अंमल होता.
▲ मध्यप्रदेशातील तळा येथील रूद्रशिवाची वैशिष्ट्यपूर्ण मूर्ती (छायाचित्र सौजन्य travelospective.blogspot)
कदाचित याच त्याच्या अधिकारामुळे त्याचा मुलगा नरेन्द्रसेन हा स्वतःला 'कोसला मेकला-मालवाधिपतिभिः अभ्यार्चितशासनः' असे बिरुद लावून घेत असे. मेकल म्हणजे आजचा मैकल पर्वत, जिथून नर्मदा नदी उगम पावते त्या भोवतालचा प्रदेश. कोसल म्हणजे दक्षिण कोसल म्हणजे आजचे छत्तीसगढ, आणि मालव म्हणजे पूर्व आणि पश्चिम माळवा, ज्याच्या विदिशा आणि अवंति इथे राजधान्या होत्या. येथील राजे त्याच्या राजसत्तेचा, आज्ञेचा सन्मान करीत असा वरील बिरुदाचा अर्थ होतो. नरेन्द्रसेन आणि पृथ्वीषेण द्वितीय या दोघांनी मिळून तीस ते पस्तीस वर्षे राज्य केले असावे. परंतु या दोघांचा समकालीन नंदिवर्धन शाखेचा राजा हरिषेण (डॉ. स्पिक यांनी निर्धारित केलेल्या वंशावलीनुसार इ.स. सुमारे ४६२ ते इ.स. सुमारे ४७८) हा होता. त्याचाच स्पष्ट अर्थ असा की, अजिंठा येथील क्रमांक १६ गुंफेतील वराहदेवाच्या शिलालेखात वर्णन केल्याप्रमाणे कुंतल, अवंति, कोसल, त्रिकूट, लाट आणि अंध्र एवढ्या मोठ्या प्रदेशावर वर्चस्व असलेल्या हरिषेणाने सत्तेवर आल्यावर काही वर्षातच आपले साम्राज्य प्रस्थापित केलेले असावे. त्यातील अवंती आणि कोसल यावर त्याची सत्ता पृथ्वीषेणाला बाजूला सारूनच प्रस्थापित झालेली असावी. वेगळ्या शब्दात इ. स. ४४०- इ.स. ४८० या काळात आपल्या पूर्वेकडील व नर्मदेपलीकडील प्रदेशावर वाकाटकांनी आपला अधिकार पक्का केला असावा.
सर्वसामान्यपणे असे मानले जाते की, चंद्रगुप्त द्वितीयाचा मुलगा कुमारगुप्त याची कारकीर्द (इ.स. ४१५- इ.स. ४५५) हा गुप्तांच्या सुवर्णयुगाचा परमोच्च बिंदू समजला जातो. याचा पिता चंद्रगुप्त द्वितीय याचे वर्णन, ज्याच्या घोडदळाने चारही समुद्रांच्या पाण्याची चव घेतली आहे, असे येते. त्याचा आजा समुद्रगुप्त एवढा पराक्रमी की त्याने गंगा यमुनेच्या दोआबपलीकडील विन्ध्याचलावरील अठरा अटवी राज्ये, पूर्वेकडे गंगासागर संगम, उत्तरेकडे हिमालय, आणि पश्चिमेला पारियात्र पर्वत एवढ्या प्रदेशातील राजांना आपले अधिराजत्व मान्य करायला लावले.
▲ नचणा येथील विविध पुरातत्त्वीय स्थळांचा नकाशा व त्यापैकी पार्वती मंदिराचा तंत्रविन्यास
गंगा यमुनेच्या किनाऱ्यावरील लहानसहान संस्थानांचा निःपात करून आपल्या साम्राज्याचा गाभा निर्वेध करून टाकला. दक्षिणेत कलिंग, पल्लव राजांना आपल्या सामर्थ्याची चुणूक दाखवली. त्यापलीकडील अनेक राजांना ते नजराणे पाठवतील एवढा वचक उत्पन्न झाला. चंद्रगुप्त द्वितीयाने तर वायव्येत वधू नदीच्या पैलतीरावर आपले सैन्य पोचवले. या पार्श्वभूमीवर गुप्तांचे सुवर्णयुग ही खासच अतिशयोक्ती नाही. पण वर उल्लेख केल्याप्रमाणे त्याचा भाचा प्रवरसेन द्वितीय आणि प्रवरसेनाचे पुत्र आणि नातू यांनी कदाचित कुमारगुप्तानंतर आपले हातपाय मैकल पर्वत, आजचा बुंदेलखंड आणि मालवा या प्रदेशात पसरले असावे. कुमारगुप्ताचा उत्तराधिकारी स्कंदगुप्त (इ.स. सुमारे ४५५-इ.स. ४६८) याच्याच काळात हुणांनी हिमालय ओलांडून काश्मीरात व त्यानंतर माळव्यात आपले प्रस्थान मांडले. भितरी शिलालेखाच्या आधारे इतिहासकार असेही मानतात की, हे परकीय आक्रमण स्कंदगुप्ताने मोठ्या निकराने परतून लावले. पण त्याचा धक्का इतका तीव्र होता की, काही इतिहासकार आलंकारिक भाषेत म्हणतात त्याप्रमाणे गुप्त साम्राज्य भंग पावले नाही तरी या काळात गुप्तसत्तेला मोठे तडे पडले होते. हुणांच्या गदारोळानंतरच त्यांना शमवण्यासाठी यशोधर्मनला पराक्रमाची पराकाष्ठा करावी लागली. यशोधर्मन याचे राज्य धार आणि उजैन जवळ होते, हे लक्षात ठेवले पाहिजे. त्यामुळे नर्मदेच्या उगमापासून बुंदेलखंड, ज्यामध्ये समुद्रगुप्ताने ज्यावर आपली पकड घट्ट केली होती अशी अठरा राज्ये होती. त्याप्रदेशात व माळव्यात राजकीय अस्थिरता होती. तिचाच फायदा नरेन्द्रसेन, पृथ्वीषेण द्वितीय व हरिषेण या वाकाटक राजांनी घेतला असावा आणि वर उल्लेखलेली वेगळ्या प्रकारची बिरुदे धारण केली असावीत. मेकल, कोसल आणि मालव या प्रदेशात अनेक लहान लहान संस्थाने होऊन गेली. उदा. शरभपुरीय, पांडुवंशी आणि सोमवंशी. त्यांचे अनेक शिलालेख मिळतात. त्यातूनही आपली इतिहासाची वाटचाल अंधुकच राहते. या प्रदेशातील राजघराण्यांचा इतिहास इतका दुर्बोध आहे की, यातील कोणते आधी आणि कोणते नंतर याबाबत अजूनही विद्वानांचे एकमत नाही. त्यांनी आपल्या लेखात आणि ताम्रपत्रात राज्यशकाचा उल्लेख केला असला तरी तो संवत गुप्तांचा की कलचुरी-चेदींचा याबद्दल विद्वानांमध्ये मतभेद आहेत. एखाद्या वंशात एकाच नावाचे दोनतीन राजे असल्यामुळे, इतर राजवंशांशी त्या राजवंशाचे संबंध काय होते, हे मांडताना समस्या निर्माण होतात.
▲ तिगोवा मंदिरातील खांब
तरीही या प्रदेशातील उच्चकल्प महाराज आणि परिव्राजक महाराज यांच्या ताम्रपटांवरून त्यांचा गुप्तवंशाशी संबंध असावा असे लक्षात येते. त्यातील परिव्राजक महाराज हे तर स्पष्टपणाने 'गुप्तनृप राज्यभूक्तौ' असा शक वर्ष देताना उल्लेख करतात. योगायोगाची गोष्ट अशी की परिव्राजक महाराजांच्या वंशावळीतील हस्ती हा राजा (त्याच्या कारकीर्दीची ज्ञात वर्षे गुप्त संवत् १५६, १६३, १९१ आणि १९८) आणि उच्चकल्प महाराजांचा शेवटचा राजा शर्वनाथ (याच्या कारकीर्दीची ज्ञात वर्षे अज्ञात संवतात दिली आहेत ती अशी १९१, १९३, १९७ आणि २१४) त्या दोघांनी सामायिकपणे दिलेल्या शिलालेखाचा उद्देश दोन राज्यांच्या सीमा ठरवण्यासाठी उभारलेल्या स्तंभासंबंधी आहे. त्या दोघांनी जरी आपले शिलालेख गुप्त संवतात दिलेले असले तरी, उच्चकल्प राजा शर्वनाथ याचा आजा व्याघ्रदेव इ.स. ४९०च्या अगोदर झालेला असावा हे निश्चित. कारण शर्वनाथाचा पिता जयनाथ याचा ज्ञात ताम्रपट हा गुप्त संवत १७४ आहे. त्याच्या ज्ञात शेवटच्या ताम्रपटातील वर्ष १७७ आहे. याचा अर्थ असा की व्याघ्रराज याचा कार्यकाल हा इ.स. ४९०च्या अगोदर निश्चितपणाने असावा. हे सर्व विवेचन करण्याचा हेतू एवढाच की, मध्यप्रदेशातील नचणा व तेथूनच जवळ असलेल्या गंज येथे 'वाकाटकांना महाराज श्रिपृथिविषेणपादानुध्यातो व्याघ्रदेवो मातापित्रोः पुण्यात्र्थे कृतिमिति' असे दोन शिलालेख आढळतात. हे दोन्ही लेख पेटिकाशीर्ष लिपीतच म्हणजे वाकाटक सम्राट ज्या लिपीत आपले लेख लिहीत असत, त्याच लिपीत लिहिलेले आहेत हे लक्षात घेण्यासारखे आहे. ज्या अर्थी त्यांच्या वंशजांचे लेख हे नंतरच्या काळात गुप्तसंवतामध्ये लिहिले गेले, त्याअर्थी इ. स. ४९० नंतर वाकाटक वैशाचा तेथील प्रभाव संपुष्टात आला असावा आणि म्हणूनच आपण नचणा येथील मंदिरांच्या अवशेषांचा व इतर मूर्तीचा आढावा घेणार आहोत. नचणा येथील चटकन डोळ्यांत भरणारी दोन देवळे म्हणजे पार्वतीचे मंदिर आणि महादेवाचे मंदिर, पार्वतीच्या मंदिरापासून थोड्या अंतरावर एक तलाव असून लाखोलोबादच्या रस्त्याने पुढे गेले म्हणजे कुमरामठ या नावाचे मंदिर रस्त्याच्या डाव्या बाजूस आहे. तिथून थोडे पुढे गेल्यानंतर रूपनीका मंदिर हे उजव्या बाजूस दिसते. त्याव्यतिरिक्त रंडी का बंगला या इमारतीतसुद्धा काही प्राचीन अवशेष आढळून येतात. कुमरामठ मंदिराच्या पूर्वेस सिद्ध का पहाड म्हणून टेकडी असून त्या टेकडीवरील एका गुंफेत गुप्तकालीन जिनमूर्ती आहेत. त्याव्यतिरिक्त विष्णु, ब्रह्मा, लकुलीश यांच्या सुट्या मूर्ती व आठ लहानशा मूर्ती असलेला एक शिल्पपटही सापडला आहे. याव्यतिरिक्त रामायणातील सहा प्रसंग कोरलेले शिल्पपटही या ठिकाणी आढळून येतात. यांचे विषय खालीलप्रमाणे आहेत.
पहिल्याचा विषय कांचनमृगाचा शोध असून त्यानंतरच्या पटात रावण सीतेकडे भिक्षा मागण्यासाठी आलेला दाखवला आहे. तिसऱ्या पटात राम आणि लक्ष्मणाची हनुमान भेट घेत असून, चौथ्यात वाली-सुग्रीवांचे युद्ध, पाचव्यात वालीचा राम घेत असलेला वेध आणि सहाव्यात हनुमानाला रावणासमोर बांधून आणल्याचा प्रसंग आहे. त्यातील कुमरामठ येथील मध्ययुगीन इमारतीत वाकाटक-गुप्तकालीन चार दरवाजांच्या चौकटी बसवल्या आहेत. त्यावर डॉ. स्पिक यांनी छवी या अभिनंदन ग्रंथात १९७१ साली एक लेख लिहिला असून या चार चौकटी एकाच सर्वतोभद्र मंदिराच्या असून ते उच्चकल्प राजांच्या काळात बांधले असल्याचे दाखवून दिले आहे. डॉ. जोआना विल्यम्स यांच्या मते ललाटपट्टावर सूर्य परिवाराचे चित्रण असल्यामुळे व दुसऱ्या एका चौकटीवर वरच्या बाजूला भू-वराह आणि यानक नारसिंह म्हणजे हिरण्यकशीपूवर चालून जाणाऱ्या नरसिंहाचे चित्रण असल्यामुळे हे मंदिर सूर्यनारायणाचे असावे असा अंदाज व्यक्त केला आहे.
डॉ. जोआना विल्यम्स यांच्या मते सर्वात महत्त्वाचे मंदिर म्हणजे पार्वती मंदिर होय. सर अलेक्झांडर कनिंगहॅम यांच्या सुप्रसिद्ध आढाव्यामध्ये यातील बऱ्याच पुरावशेषांची सर्वप्रथम नोद केली आहे. कनिंगहॅम यांनी त्या काळात छापलेल्या छायाचित्रावरून हे मंदिर किमान दोन मजली तरी होते. एका चौकोनी जोत्यावर हे मंदिर उभारले असून गर्भगृहाच्या भोवती प्रदक्षिणा मार्ग होता. आज जरी या मार्गाच्या भिंतींचा बराचसा भाग आणि छत पूर्णपणे नाहीसे झाले असले तरी ते सांधार मंदिर होते, हे कनिंगहॅम यांच्या वृत्तान्तावरून स्पष्ट दिसते. दरवाज्याची चौकट, त्या भोवतीचा काही भाग तुटला असला तरी बरीचशी शाबूत आहे आणि त्यातील पाच शाखा स्पष्टपणे दिसतात. या काळातील पद्धतीप्रमाणे चौकट इंग्रजी अक्षर 'टी' या आकारात असून, वरच्या भागात दोन्ही बाजूला शालभंजिका आहेत. त्याच्या आतील तिसरी शाखा वरील तीन चंद्रशालांमुळे गोपुरासारखी दिसते. त्याच्या आतील दुसऱ्या शाखेवर दोन्ही बाजूस मिथुने, खाली गंगा-यमुना आणि ललाटपट्टीकेवर शिव-पार्वती व परिवार आहे, सर्वात आतील म्हणजे पहिल्या शाखेवर दोन बाजूस पद्मनाभ यक्ष असून त्यातून वर झेपावणाऱ्या दोन पद्मलतांचा संगम चौकटीच्या मध्यभागी झालेला दिसतो आणि खाली शूल धारण करणारे शूलपुरुष शेजारी असलेले द्वारपाल आहेत. आज जरी त्याचे नाव पार्वती मंदिर असले तरी ते एक शिवालय होते. आणि कदाचित शिवलिंगाऐवजी चतुर्मुख सदाशिवाची मूर्ती आतमध्ये असावी. येथे पुरातत्त्व विभागाच्या खात्याने जमा केलेल्या मूर्तीमध्ये लकुलीशाची प्रतिमा असल्यामुळे तिचीही स्थापना कोठेतरी केलेली असावी. कदाचित ती वरच्या मजल्यावरसुद्धा असेल. प्रदक्षिणामार्गाच्या भिंतीचे कठड्यासारख्या दिसणाऱ्या भागावर पर्वताकृती गुहा आणि वन्य प्राण्यांचे चित्रण आहे. त्यामुळे स्थपतीने या मंदिराची कैलासरूपात कल्पना केली असावी. प्रदक्षिणामार्गाच्या ढासळलेल्या भिंतीतसुद्धा स्तंभ शाखा असलेली तीन जालवातायने असावीत, असे म्हणण्याइतका पुरावा विखुरलेल्या अवशेषांतून प्राप्त झाला आहे. डॉ. जोआना विल्यम्स यांच्या अनुमानाप्रमाणे या मंदिरातील स्तंभजालवातायने ही शेजारच्या मंदिरात बसवलेली आढळतात.
▲ नचणा येथील पार्वती मंदिराची द्वारशाखा. (नचणा व तिगोवा मंदिर छायाचित्र सौजन्यः एआयआयएस संग्रहण)
सापडलेल्या पुरावशेषांमध्ये खट्वांग धारण करणारा आणि भृंगारातून दुसऱ्या पात्रात जल ओतणारा गण सापडला आहे. समोरच्या महादेव मंदिरात नाग असलेले लहान जालवातायन बसवलेले आहेत. या निरनिराळ्या प्रकारच्या शिल्प प्रकारावरून तसेच शिल्प प्रयोजनावरून अभिजात आणि स्थानिक शिल्पशैलीचा इथे उत्तम मिलाफ झाल्याचे दिसून येते. आणि त्यामुळे डॉ. जोआना विल्यम्स यांच्या मते पार्वती मंदिराचा काल इ. स. सुमारे ४८० ते इ. स. ५०० इतका होतो. त्यांच्या मते याच काळात सम्राट हरिषेण हा वत्सगुल्म इथे राज्य करीत असल्याने हे मंदिर त्याच्या काळातील असावे हे मानावयास हरकत नाही. त्यांच्या मते हरिषेणाच्या अगोदर मेकल आणि मालव येथील संस्थानांवर नरेन्द्रसेन आणि द्वितीय पृथ्वीषेण यांच्या काळात हे पार्वती मंदिर बांधले गेले असावे. दोन शिलालेखांत उल्लेख केलेला व्याघ्रदेव हा द्वितीय पृथ्वीषेणाचा समकालीन होता यात शंका नाही. या संदर्भातील व्याघ्रदेवाच्या शिळेवर सुदर्शन चक्राचे चित्रण आहे ही बाब या संदर्भात सूचक आहे. डॉ. देवदत्त भांडारकर यांनी पुन्हा संपादित केलेल्या गुप्त अभिलेखांच्या खंडाच्या प्रस्तावनेत असेही नमूद केले आहे की, पंजाब आणि आसाम या दोन ठिकाणी असे चक्रमुद्रांकित, सात्वतधर्मानुयायी वैष्णवांचे शिलालेख सापडलेले आहेत. व्याघ्रदेव हा आपला सम्राट पृथ्वीषेण द्वितीय याच्याप्रमाणेच परमभागवत होता, हे या पुराव्यावरून सिद्ध होते. नचना येथील पुरातत्त्व विभागाच्या चौकीदाराच्या पडवीत ठेवलेल्या मूर्तीमध्ये एक खंडित विष्णूची प्रतिमा, कुमरामठ येथील दाराच्या चौकटीवर वराह आणि नरसिंहाची चित्रणे आणि तेथून फार दूर नसलेल्या मढिया येथील वामन मंदिरात असलेली हयग्रीवाची प्रतिमा या सर्वांवरून उच्चकल्प राजवटीत सात्वत धर्माचा प्रसार ठळकपणे झाला होता हे स्पष्टपणे दिसते. तर हल्लीचे पार्वती मंदिर, महादेव मंदिर, सदाशिवमूर्ती आणि विशेषकरून लकुलीश मूर्ती यावरून पाशुपत धर्मसुद्धा प्रतिष्ठित झाला होता हे दिसते. समकालीन तीर्थंकर मूर्तीवरून त्या भागात जैन धर्माचे उपासकसुद्धा होते हे कळते. विशेष म्हणजे वाकाटक वंशातील राजांच्या प्रमाणेच उच्चकल्प वंशातसुद्धा 'परममाहेश्वर' आणि 'परमभागवत' राजे होते हे लक्षात येते.
या संदर्भात भुमरा येथील परिव्राजकवंशीय राजांनी दगडात बांधलेल्या शिवमंदिराचा उल्लेख करणे अपरिहार्य आहे. भुमरा येथील शिवमंदिरावर राखालदास बॅनर्जी यांनी एक प्रबंध प्रकाशित केला होता. हे मंदिर काहीसे नचना येथील पार्वतीमंदिराचा विन्यास असल्यासारखे एका चौकोनी चौथऱ्यावर असून आयताकृती पूर्वाभिमुखी असून समोर पायऱ्या त्याच्या उभयता दोन देवकुलिका यासाठी एक लहान चौथरा आहे. मध्यभागी गर्भगृह असून, तीन बाजूंनी प्रवेश करता येईल असा मंडप समोर असावा, हे लक्षात येण्याइतपत खुणा आहेत. आजतरी गर्भगृह एकमजली चौकट आहे. याकाळातील इतर मंदिरांप्रमाणे ती 'टी' या इंग्रजी अक्षराच्या आकाराची असून, ती तीन शाखांची आहे. मधल्या शाखेवर स्त्रीपुरुषांची चित्रणे असून त्यावर गोपुर रेखाटले आहे. मधल्या चन्द्रशालेच्या खाली शिवाची आवक्ष प्रतिमा असून, दोन्हीकडून विद्याधर व सिद्ध गंधर्व आकाशमार्गाने येऊन माळा अर्पण करीत आहेत असा प्रसंग कोरला आहे. चौकटीच्या तळाशी गंगा-यमुनांच्या प्रतिमा आहेत. एकूणच शिल्पशैलीवरून हे नचना येथील शिव आणि महादेव मंदिरापेक्षा नंतरच्या काळातील (म्हणजे इ. स. ५२०-५३० या काळातील) असावे, असा विद्वानांचा कयास आहे. या काळातील परिव्राजक राजे आपल्या ताम्रपटात 'गुप्तराज्यभुक्तौ' म्हणजे गुप्तांच्या राजवटीचा उल्लेख करून गुप्त संवतातच कालनिर्देश करत असल्यामुळे अर्थाअर्थी त्या कलाकृतीचा वाकाटकांच्या संदर्भात संबंध नाही. त्याचबरोबर मंदिराच्या सभोवताली सापडलेल्या आता सुट्या झालेल्या शिल्पावरून असे लक्षात येते की, मंदिरावर यम, इत्यादी लोकपालांचे चंद्रशालांतून चित्रण केलेले दिसते. त्यावरूनही हे नंतरच्या काळातील आहे हे लक्षात येते. पण तलविन्यासाच्या दृष्टीने हे नचना येथील पार्वती मंदिराला जवळचे असल्यामुळे त्याचे इथे वर्णन केले आहे. विशेष म्हणजे गोंदिया जिल्ह्यातील नागरा येथील उत्खननात उघडकीस आलेल्या शिव मंदिराशी असलेल्या वैशिष्ट्यपूर्ण साम्याचा आपल्याला उल्लेख केला पाहिजे. या विटांनी बांधलेल्या मंदिरचे जोते दोन मीटर उंच असून, ते सव्वीस मीटर रुंद आणि बेचाळीस मीटर लांब आहे. येथेही चौथऱ्याच्या पुढील भागातून अंगच्या पायऱ्या असून त्यांच्या उजव्या डाव्या बाजूस भुमरा येथील मंदिराप्रमाणेच दोन देवळ्या आहेत. मंदिरातील शिवलिंग हे चौकोनी ब्रह्मभाग आणि वरील गोल रुद्रभाग अशा दोन भागात कोरले आहे. शिवलिंगावरील अभिषेकाचे पाणी, जोत्याखालील कुंडात साठवण्यासाठी एक पन्हाळ आहे. त्या पन्हाळीचा दर्शनी भाग नेहमीच्या मकराऐवजी रौद्र मानव मुखात आहे. त्याला शात्रीय परिभाषेत भूतप्रणाल असे म्हणतात. याविषयी आपले मत व्यक्त करताना डॉ. मधुसूदन ढाकी यांनी त्याची प्राचीनता इ.स. ४०० पर्यंत जाऊन शकते, असे म्हटले होते. आपणास असे म्हणता येईल की एका अर्थाने नागरा येथील विटांनी बांधलेल्या शिव मंदिराचा नकाशा डोळ्यासमोर ठेवून नंतरच्या काळात भुमरा येथील शिव मंदिर बांधले असावे.
▲ नचणा येथील पार्वती मंदिराच्या द्वारशाखेवरील द्वारपात्र व शूत्रपुरुष
मध्य प्रदेशातील तिगवा येथील देवीमंदिराचा उल्लेख केल्याशिवाय कोसल-मेकला भागातील वाकाटक प्रभावित कलेचा आढावा पूर्ण होणार नाही. सर अलेक्झांडर कनिंगहम यांनी या स्थानाला भेट दिली, त्या वेळी दगडात बांधलेली गुप्त-वाकाटक काळातील मंदिरे मोठ्या संख्येने होती, हे त्यांच्या लक्षात आले. आज फक्त या मंदिरांचे चौथरेच शिल्लक आहेत. चौकशी करता कनिंगहम यांना असे सांगण्यात आले की जवळच एक लोहमार्ग टाकण्यासाठी येथील शिलांचा खडी तयार करण्यासाठी वापर करण्यात आला. आज आपणास एवढेच म्हणता येते की आर्थिकदृष्ट्या इ. स.च्या चौथ्या, पाचव्या शतकात हे एक महत्त्वाचे ठिकाण असून ते राजकीयदृष्ट्टयासुद्धा लक्षणीय असावे. हे मंदिर भुमराच काय पण नचना येथील मंदिरसंकुलापेक्षाही प्राचीन असले पाहिजे. त्याचा तलविन्यास सांची येथील स्तूपासमोरील क्रमांक १७ च्या देवालयाप्रमाणे असून समोर चार खांबांवर तोललेला, गर्भगृहाइतका रुंद असलेला उघडा मंडप, त्यापाठीमागे गर्भगृहाच्या दरवाजाची चौकट आणि भिंत, आणि मागे चौकोनी गर्भगृह अशी रचना आहे. गर्भगृहाच्या छतावर मोठ्या कमळाची चित्र असून मंडपाचे व मागल्या भिंतीतील अर्धस्तंभ हे सांची येथील देवालयातील खांबांसारखेच आहेत. खाली चौकोनी, मध्यभागी अष्टकोनी व षोडशकोनी त्यावर पूर्णघट, स्तंभशीर्षांवर चंद्रशाला व एकमेकांकडे पाठ करून उभे असलेले सिंह, मधोमध वृक्ष अशी खांबांची जडणघडण आहे. आणि त्यामुळे या मंदिरातील शिल्प आणि स्थापत्यातील शैलीमुळे तसेच अभिलेखीय पुराव्यावरून मंदिराचा काल इ.स. सुमारे ४४५-४७० असा ठरवण्यात आला आहे. दरवाजा 'टी' या इंग्रजी अक्षरासारखा आहे. सगळ्यात बाहेरची शाखा स्तंभशाखा असून वरच्या भागात शालभंजिकांचे चित्रण आहे. आतील चौकटीवर आणि पृथ्वीषेण द्वितीय यांनी पद्मपुष्पांची चित्रणे आहेत. तेथूनच थोड्या दूर अंतरावर कुंडा येथे अशाच पण अधिक अनलंकृत अशा मंदिराचे अवशेष डॉ. देबला मित्रा यांना सापडले (इ. स. सुमारे ४७५). नंदिवर्धन शाखेचा प्रवरसेन द्वितीय आणि त्याचा पुत्र व नातू नरेंद्रसेन नर्मदेपलीकडे केलेला राज्य विस्तार लक्षात घेता, तिगवा येथील मंदिर हे वाकाटकांच्या स्थापत्यशिल्पकलेचा नमुना आहे, अशा निष्कर्षाप्रत म.म. वा. वि. मिराशी आले. कुंडा येथील मंदिराबाबतसुद्धा हेच मत आहे.
▲ सिद्ध का पहाड येथील तीर्थंकर मूर्ती
पाशुपत धर्माच्या संदर्भात तळा येथील प्राचीन कोसल राज्यात बांधलेल्या देवराणी आणि जेठाणी या दोन मंदिरांचा व आसपास सापडलेल्या एका विलक्षण रुदमूर्तीचा उल्लेख करणे भाग आहे. या मंदिरांचा काळ डखें. जोआना विल्यम्स यांच्याप्रमाणे इ.स. ४८०-इ.स.५३० असा आहे. देवराणी मंदिराचा तलविन्यास चौकोनी गर्भगृह व समोर आयताकृती मंडप असा आहे. गर्भगृहाची चौकट 'टी' या इंग्रजी अक्षराच्या आकाराची असली तरी त्यावरील शाखा आणि अलंकरण हे भरगच्च आहे. त्यामध्ये पद्मलता, रत्नमाला, पुष्पे अशी नेहमीचीच प्रयोजने असली तरी त्याचे चित्रण एका वेगळ्या ढंगात करण्यात आलेले आहे. मंडपाच्या सुरुवातीस असलेल्या स्तंभांची घडण चौकोन, अष्टकोन, त्यावर अनेक पन्हाळी कोरलेला स्तंभाचा वरचा भाग आणि शेवटी पूर्ण कलश अशी आहे. या काळात नरेंद्रसेन पृथ्वीषेण आणि हरिषेण या तिघांचेही कोसलावर अधिराज्य असल्याने दुरान्वयाने ते वाकाटक स्थापत्य आणि शिल्प यांचाच आविष्कार आहे असे म्हणता येईल. परंतु विशेष उल्लेख करण्यासारखी गोष्ट म्हणजे येथे सफाई करताना उत्खननात सापडलेली वेगळ्या प्रकारची रुद्रशिवाची मूर्ती. या रुद्रमूर्तीचे निरनिराळे अवयव पशुरूपात कोरलेले आहेत. उदाहरणार्थ खांदे मकराप्रमाणे, हनुवटी खेकड्यासारखी, नाक सरड्याच्या आकाराचे, भुवया सापासारख्या आणि डोळे भुग्यासारखे, तर गुडघे सिंहासारखे दाखवले आहेत. मूर्तीच्या दोन्ही बाजूस फणा उभारलेला एकेक नाग असून, शरीराच्या इतर अवयवावर शिरे कोरली असल्यामुळे हा चतुःमूर्ती किंवा अष्टमूर्ती शिवाप्रमाणे असल्यासारखा भासतो. तूर्त एवढेच नमूद करता येईल, की मांढळ इथे सापडलेल्या अष्टमूर्ती किंवा द्वादशमुख असलेल्या शिवमूर्तीसारखी शिवाविषयीची संकल्पना मूर्तिकाराच्या मनात असली पाहिजे. आणि त्या अर्थाने तळाला येथील देवराणी मंदिर येथील अनोखी शिवमूर्ती आणि मांढळ येथील शिवप्रतिमांची नाळ जुळलेली आहे असे दिसते.
response.lokprabha@expressindia.com
महाराष्ट्र राज्याचा पुरातत्त्व विभाग आणि नागपूर विद्यापीठ यांनी पूर्व विदर्भात मोठ्या प्रमाणावर उत्खनन-गवेषणाचा कार्यक्रम हाती घेतला होता, हे यापूर्वीच्या लेखातून स्पष्ट झाले आहेच. मनसरवरील लेखात भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षणानेसुद्धा पूर्व विदर्भर्भात उत्खनने हाती घेतली आणि वाकाटकांचे पुरातत्त्व व त्याच्या जोडीने त्यांच्या कलेचा इतिहास जाणून घेण्यासाठी त्या उत्खननांचा लक्षणीय रीतीने उपयोग झाला असे लक्षात येईल. गवेषणाचा कार्यक्रम मात्र हा, उत्खननाशी तुलना करता, निरंतर रीतीने चालू राहू शकतो, आणि तसा तो राहिला. या संदर्भात डॉ. माने आणि मी संयुक्तपणे मध्यप्रदेश आणि महाराष्ट्रातील वाकाटककालीन गुंफांचे एक सर्वेक्षण केले. हे काम आम्ही जवळजवळ तीन वर्षे केले. आणि त्यातून जवळजवळ विसेक ठिकाणच्या गुंफांचा आम्हाला आढावा घेता आला. महाराष्ट्रातील चंद्रपूर, भंडारा, गोदिया, नागपूर, अमरावती, वाशीम या जिल्ह्यांव्यतिरिक्त नांदेड, उस्मानाबाद आणि औरंगाबाद या मराठवाड्याच्या तीन जिल्ह्यांतील गुफांचाही परामर्श घेण्याची संधी मिळाली.
असा प्रकल्प हाती घेण्यामागे एक आणखी वेगळाच उद्देश होता. जितक्या विपुल प्रमाणात पश्चिम महाराष्ट्राच्या, म्हणजे सह्याद्री पर्वताच्या दऱ्याखोऱ्यांतून, गुंफा आढळतात तितक्या विपुल प्रमाणात विदर्भाच्या डोंगराळ भागात आढळत नाहीत ही बाब बहुतांशी संशोधकांना मान्य आहे. पण एका दृष्टीने बघितले तर गुंफा कोरण्याची परंपरा पश्चिम महाराष्ट्रापेक्षा विदर्भात अधिक प्राचीन आहे असे म्हणावे लागते. कारण गुंफा कोरण्याची पद्धत या भागातील आदिवासींमध्येही प्रचलित होती. आणि सांस्कृतिकक्रमदृष्ट्या ती पूर्वेतिहास काळाच्या (म्हणजे इ.स. पू. तिसऱ्या शतकाच्या) अगोदरही बृहदअश्मयुगापर्यंत पोचते. बृहदाश्मयुगीन संस्कृतींचे मूळ विदर्भर्भात जवळजवळ इ. स. पूर्वीच्या एक हजार वर्षांपर्यंत जाऊ शकते. बृहदअ हदअश्मयुगीन गुफांमध्ये त्या कोरण्यात आल्या त्यावेळी लिपिज्ञान विकसित झाले नसल्याने, आणि या गुफांचे स्थापत्य काटेकोर नसल्यानेही त्या गुंफा नेमकी कुठल्या शतकात कोरण्यात आली हे आज उपलब्ध असलेल्या पुराव्यांच्या आधारे सांगता येत नाही. बृहदअअश्मयुगीन संस्कृतीच्या अभ्यासातील एक कच्चा दुवा असा की विदर्भ जनपदाचे नागरीकरण हे इ.स.पू. पाचव्या शतकात झाल्यानंतर बृहदअश्मयुग अस्ताला गेले अशी नोद आपण करत असलो तरी बृहदअश्मयुगीन परंपरा त्या त्या आदिवासींच्या समाजात काही शतके तरी प्रचलित होत्याच. आणि त्यामुळे एखादी गुफा बृहदल अश्मयुगीन परंपरेतील असली तरी ती इ. स. पू. पाचव्या शतकानंतरचीही असू शकते.
▲ सालबर्डी गुंफेचा आराखडा
हे सर्व विवेचन करण्यामागील हेतू असा की, गेल्या काही वर्षांत अशा प्रकारच्या म्हणजे ज्यांना आपण प्रागैतिहासिक म्हणू शकतो अशा गुंफांचा अभ्यास काही संशोधकांनी हाती घेतला आहे. त्यांच्या मते गुंफा कोरण्याचे तंत्र हे विदर्भात इ. स. पू. तिस-या शतकाच्या आदिवासीना अगोदरच ज्ञात असल्याने, महाराष्ट्रातील गुंफा स्थापत्याचा इतिहास लिहीत असताना ही गोष्ट ठळकपणे नौदली गेली पाहिजे. यापुढे जाऊन उत्साहाने हे संशोधक असे म्हणतात की मौर्यानंतरच्या आणि सातवाहनांच्या अगोदरच्या काळामध्ये जे शकक्षत्रप राजे विदर्भात राज्य करीत होते, त्यांनी हे गुंफा कोरण्याचे तंत्र विकसित केले आणि त्याचाच परिपाक म्हणून पश्चिम महाराष्ट्रातील बौद्ध लेणी कोरण्यात आली. वेगळ्या शब्दात पश्चिम महाराष्ट्रतील समृद्ध लयन-स्थापत्याचे मूळ बृहदअश्मयुगीन गुंफांमध्ये शोधले पाहिजे. प्रस्तुतचा लेख लिहिताना हा जो दावा केला गेलेला आहे तोसुद्धा आपण तपासून पाहणार आहोत.
▲ लंकेश्वर गुंफा
आपण सर्वप्रथम विदर्भातील बौद्ध गुंफांचाच विचार करूया. सातवाहन काळातील काही गुंफा चंढाळ्याच्या जंगलात डॉ. शां. भा. देव यांना सापडल्या होत्या. स्थापत्यदृष्ट्या त्या वैशिष्ट्यपूर्ण नसल्या तरी समकालीन लिपीत गुंफांमध्ये कोरलेल्या लेखांवरून त्या इ. स. पू. पहिल्या शतकातील असाव्यात असा अंदाज करण्यात आला होता आणि तो खराही ठरला. तेथून फारसे दूर नसलेल्या पौनी येथील स्तूपामुळे या तर्काला पुष्टीही मिळाली. परंतु त्याहीपेक्षा जवळजवळ १०० वर्षांपूर्वी चंद्रपूर जिल्ह्यातील भांदक येथील नौदल्या गेलेल्या बौद्ध गुंफेचा मात्र या संदर्भात फारसा गाजावाजा झाला नाही. विझासन म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या बौद्ध गुंफेची नोद विस्तृत प्रमाणावर अलेक्झांडर कनिंगहॅमचा सहाय्यक बेगलर याने घेतली आहे. कनिंगहॅमच्या वतीने १८७३-७४ आणि १८७४-७५ या दोन वर्षांत मध्यप्रांतात केलेल्या सर्वेक्षणात या गुंफेचा उल्लेख आढळतो. या बरोबरच त्याने या गुंफेचे मानचित्रही प्रकाशित केले आहे. भांदकच्या वायव्येस दोन कि. मी. अंतरावर विझासन नावाची
टेकडी आहे. टेकडीवर थोडेसे चढून गेल्यावर खडकामध्ये कोरून काढलेला एक मार्ग, त्याच्या दोन्ही बाजूला कोरलेले कट्टे आणि भिंतीवर अवलोकितेश्वर व इतर बोधिसत्त्वांची शिल्पे कोरलेली आढळतात. पुढे चालून गेल्यानंतर, गुंफेचे प्रवेशद्वार आणि त्याच्याहीवर काही स्तूप अर्ध उठावात कोरलेले दिसून येतात. कोरलेले स्तूप आणि बोधिसत्त्वांच्या प्रतिमांवरून ही गुंफा पाचव्या शतकात कोरण्यात आली असावी असा अंदाज बांधता येतो. प्रवेशद्वारातून आत जाईपर्यंत मात्र तिचे स्थापत्य नेमके कुठल्या स्वरूपाचे असेल त्याची काहीच कल्पना करता येत नाही. हे बौद्ध मंदिर तीन गुंफांचे मिळून झालेले आहे. आणि या तिन्ही गुंफांचा प्रवेश सामाईक अशा अंगणातून होतो. मुख्य गुंफा पूर्वाभिमुख असून ती ७४ फूट खोल आहे. दक्षिणेची ३५ फूट खोल असून, उत्तरेची ४७ फूट खोल आहे. प्रत्येक गुंफेच्या शेवटी एक गाभारा असून त्यामध्ये ध्यानमुद्रेत बसलेली भगवान बुद्धाची भीमकाय मूर्ती कोरण्यात आलेली आहे. गुंफांच्या निमुळत्या तोडाशी प्रवेशद्वारे आहेत. द्वार ओलांडून गेल्यानंतर एक चिंचोळा व्हरांडा, त्यामागे विस्तीर्ण असे सभागृह, त्यानंतर अरुंद असे अंतराळ व सर्वात शेवटी गाभारा आहे. समोरचा व्हरांडा, सभागृह, अंतराळ आणि गाभारा यात कुठेही खांब नाहीत. मुख्य म्हणजे पूर्वाभिमुख गुंफेत सभागृहाच्या बाजूच्या भीतीत तीन निवासकक्ष आहेत. सभागृहांची छते कमानीच्या स्वरूपात कोरलेली आहेत हे या गुंफांचे वैशिष्ट्य म्हणता येईल. मुख्य गुंफेच्या प्रवेशद्वाराजवळ इ. स. चौथ्या-पाचव्या शतकातील ब्राह्मी लिपीत कोरलेला एक लहानसा लेखही आढळून आला आहे. या सर्वांवरून ही गुंफा पाचव्या शतकात कोरण्यात आली असावी असे स्पष्ट होते. परंतु काही शिल्पे ही उत्तरकालीन असल्यामुळे या गुंफेचा विकास इ. स. सातव्या-आठव्या शतकापर्यंतही होत राहिला असावा, असे म्हणण्यास वाव आहे, चंढाळ्याच्या जंगलातील इ. स. पू. पहिल्या शतकात कोरलेल्या अगदी साधारण अशा भिक्षूनिवासानंतर हा अत्यंत प्रगल्भ असा गुंफास्थापत्याचा विकास कसा झाला हे सांगणे आजतरी शक्य नाही. त्याचबरोबर या अगदी वेगळ्या अशा बौद्ध गुंफेचा पश्चिम महाराष्ट्रातील समकालीन बौद्ध गुंफांशी संबंध कसा जोडायचा हेही लक्षात येत नाही. आणि त्यामुळे पश्चिम महाराष्ट्रातील बौद्ध स्थापत्याचे मूळ विदर्भर्भात शोधले पाहिजे असा नवीन विचार मांडल्यास विंझासन येथील ही गुंफा अत्यंत वेगळी का, हेही स्पष्ट करावे लागेल.
सालबर्डी येथील दोन बौद्ध गुंफांची पाहणी केल्यास वरील मताची आणखी खात्री पटेल. सालबर्डी हे ठिकाण मध्य प्रदेश आणि महाराष्ट्र यांच्या सीमेवर असून अमरावती जिल्ह्यातील मोर्शी या तालुक्याच्या ठिकाणापासून उत्तरेस आठ कि. मी. वर आहे. त्या ठिकाणाला हिंदू भाविकांच्या दृष्टीने महत्त्व असून दर महाशिवरात्रीस डोगरातील एका नैसर्गिक विवरामध्ये असलेल्या शिवलिंगाच्या पूजेसाठी भाविक लोक मोठ्या संख्येने येतात, व त्याला जत्रेचे स्वरूप येते. परंतु पुरातत्त्वदृष्ट्या इतरही गुंफांचे अवशेष या ठिकाणी डॉ. ग. का. माने, डॉ. बोरकर यांना आणि मला सापडले. यातील दोन बौद्ध गुंफांचा उल्लेख डॉ. मो. ग. दीक्षित आणि रायबहाद्दूर हिरालाल यांच्या लिखाणातून आला असला तरी यांचा अभ्यास झाला नव्हता. येथील अभ्यासावरून आमच्या लक्षात आले, की समोर ८.२ मी. ७ २.७५ मी. इतका आडवा व्हरांडा, आतमध्ये मंडप (७.७ चौ. मी.) असून त्याच्या तिन्ही बाजूला म्हणजे पूर्वेस, पश्चिमेस आणि दक्षिणेस तीन कक्ष आहेत. त्यातील दक्षिणेचा कक्ष आणि मंडप यामध्ये दरवाज्याच्या दोन्ही बाजूस दोन भित्तीगत स्तंभ (पिलॅस्टर) आहेत. सभागृहाच्या मध्यभागी ४.८ मी. ७३.९ मी. असा एक चौथरा आहे.
▲ हिरपूर येथील उत्खनन
कदाचित ही गुंफा पूर्ण झाली नसावी. कारण सभागृहाच्या दोन बाजूस असलेल्या कक्षामध्ये अथवा दक्षिणेस असलेल्या गर्भगृहात आज कोणतेही - शिल्प दिसत नाही. खांबांच्या ठेवणीवरून आणि तलविन्यासावरून ही गुहा वाकाटककाळात कोरली गेली यात शंका नाही. बाहेरच्या तळखड्यावर अलंकरणयुक्त खांब वर स्तंभशीर्षाला लागून तरंगयुक्त दोन हस्त (बॅकेट) आहेत. व्हरांड्यातील दोन्ही बाजूला दोन कक्ष आहेत. या व्हरांड्यातील दोन खांब तसेच बाजूला असलेले दोन अर्धस्तंभ हे थेट अजिंठा येथील खांबांच्या प्रतिकृती आहेत.
लंकेश्वर गुंफेशी तुलना करता तिथूनच थोड्या अंतरावर असलेली पंचावतार गुंफा ही पूर्ण कोरली होती. आणि त्यात मूर्तीची प्रतिष्ठापनाही करण्यात आली होती हे सहज लक्षात येते. गुंफा उत्तराभिमुख असून तिचा तलविन्यास दोन स्तंभावर तोललेला व्हरांडा (ज्याचा शिल्पशास्त्रामध्ये वीथी असा उल्लेख येतो), मागे मंडप, मंडपाच्या पूर्व-पश्चिमेस दोन खांबांनी विभक्त झालेली दोन पाखी आणि मागे गर्भगृह असा आहे. लंकेश्वर आणि पंचावतार यामधील एक लक्षणीय फरक म्हणजे व्हरांड्याला लागून बाजूला असलेले कक्ष हे लंकेश्वरातील कक्षेपेक्षा दुप्पट आकाराचे असून सभागृहातील दोन पाखी दाराच्या साहाय्याने त्यांना जोडण्यात आलेली असावीत. आणखी एक सकारात्मक फरक असा की पंचावतार गुंफेतील मुख्य प्रवेशद्वाराच्या चौकटीवर सफेदीचे जाड थर असले तरी, व त्यावरील नक्षी सहज लक्षात येते. आणि तिचे साम्य नचणा-कुठारा येथील शिवालयाच्या चौकटीशी आहे हेही लक्षात येते. आतील गाभारा सुमारे २.५ मी. बाय २ मी. असून मुख्य मूर्ती ही श्रावस्तीच्या चमत्कारातील (महाप्रतिहार्य) बुद्ध मूर्तीप्रमाणे दोन्ही बाजूला नाग असलेल्या कमळावर बसलेली असून भूमिस्पर्श मुद्रेत तिचा उजवा हात आहे. आणि तिच्या डाव्या आणि उजव्या बाजूस अवलोकितेश्वर आणि वज्रपाणि आहेत. इथे चक्रधर स्वामीनी निवास केलेला असल्यामुळे व महानुभाव पंथाच्या प्रथेप्रमाणे बांधलेल्या ओट्यामागे आज गाभाऱ्यातील या मूर्ती झाकल्या गेलेल्या आहेत. बुद्धमूर्ती आज शिरोविहीन आहे, परंतु बोधिसत्त्वांच्या लांच्छनांवरून तसेच भूमिस्पर्श-मुद्रेवरून वाकाटकांच्या उत्तरकाळात ही कोरली असावी हे स्पष्टपणे दिसते. या दोन्ही गुंफांच्या ठेवणीवरून जळगाव जिल्ह्यातील बानोती इथल्या बौद्ध गुंफेची आठवण येते. त्यामुळेच या गुंफांचा काल इ.स. ४७५ असे ठखण्यास हरकत नाही.
या काळातील शैव गुंफांचा विचार केल्यास सर्वप्रथम पातुर येथील गुंफेचा विचार केला पाहीजे. जेम्स फर्ग्यूसन आणि जेम्स बर्जेस या दोघांनीही या गुंफेची दखल घेतली आहे. पण गुंफेतील शिल्पे भग्न पावल्याने गुंफेच्या दर्शनी भागावर नामनिर्देश असलेले काही फुटकळ अभिलेख आहेत यापलीकडे त्यांना काहीही सांगता आलेले नाही. सौदरराजन यांनी 'केव्ह टेम्पल्स ऑफ द डेक्कन' या टेम्पल सर्व्हे ऑफ इंडिया या भारतीय सर्वेक्षणाने हाती घेतलेल्या उपक्रमांतर्गत दख्खनमधील बौद्धेतर गुंफांचे व्यापक सर्वेक्षण हाती घेतले व त्यावर आधारलेला छायाचित्रे व मानचित्रे समाविष्ट केलेला एक मोठा ग्रंथ प्रसिद्ध केला. परंतु त्यातही पातुर येथील गुंफांची दखल घेण्यात आली नाही. नागपूर येथील मध्यवर्ती संग्रहालयातील प्राचीन शिल्पांची नोंदवहीत घेतलेली टिपणी पाहता असे लक्षात आले की तपस्यामग्न पार्वती अथवा अपर्णेचे शिल्प पातुर येथून आणून संग्रहालयात प्रदर्शित केले आहे. पातुर येथील लेण्यांची प्रत्यक्ष पाहणी केली असता जोडगुंफापैकी डावीकडील गुंफेत पीठावर चौकोनी खोबण असून मूर्तीच्या खालच्या भागात चौकोनी दंडाची (tenant) सोय करण्यात आली असावी. पार्वतीच्या मूर्तीची तपासणी केल्यानंतर तिचा दंड त्या पीठावरील खोबणीशी मिळताजुळता आढळला. तसेच त्या गुंफेत बाजूला एका लहान कक्षामध्ये पट्टावर साताठ मूर्तीचे भग्नावशेष दिसतात. हे सप्तमातृकांचे असावेत असा तर्क करण्यासाठी जागा आहे. त्यालाच समांतर असलेल्या उत्तरेकडील गुंफेत पार्वतीऐवजी शिवलिंग प्रतिष्ठित करण्याची सोय करण्यात आलेली आहे. सप्तमातृकांना समांतर असलेल्या कक्ष आणि गाभारा असलेल्या लहान गुंफेत एक आणखी पीठ आहे, ते कदाचित कार्तिकेय आणि गणेशासाठी असावे. या जोडगुंफा आकाराने सारख्या नसल्या तरी त्यांचा तलविन्यास एकसारखा आहे. समोरचा व्हरांडा किंवा वीथी, दोन स्तंभ आणि दोन अर्धस्तंभ यावर तोलला आहे. मंडपाच्या सुरुवातीससुद्धा असेच दोन स्तंभआणि अर्धस्तंभ आहेत. हे स्तंभचौकोनी असून मध्यभागी अष्टकोनी आहेत, वॉल्टर स्पिंक यांच्या समवेत जेव्हा आम्ही या दोन गुंफांची पाहणी केली; त्यांचेही असेच मत झाले की या इ. स. पाचव्या शतकाच्या मध्यास म्हणजे अजिंठा येथील गुंफांच्या १५ वर्षे अगोदर तरी कोरण्यात आल्या असाव्यात. दर्शनी भागावर असलेल्या ब्राह्मी लिपीतील फुटकळ लेखांनी वरील तर्कास पुष्टी मिळाली. त्या संदर्भात सालबर्डी येथे एका नाल्याच्या काठावर कोरलेल्या एका शैव गुंफेचे स्मरण होते. पंचावतार आणि लंकेश्वर या बौद्ध गुंफांपासून ५०० यार्ड अंतरावर ही लहानशी गुंफा कोरलेली आहे, ती एखाद्या कोनाड्यासारखी असून २.६ मी. बाय २.१ मी. अशा आकाराची असून १.५ मी. उंच आहे. आतमध्ये एका पीठावर शिवलिंग आहे. आणि दर्शनी भागावर एका द्विभुज गणेशाची मूर्ती कोरली आहे. शेजारी दुसरा कोनाडा असून त्यातसुद्धा एका शिवलिंगाची प्रतिष्ठापना करण्यात आली आहे. परंतु त्याच्या दर्शनी भागावर द्विभुज लकुलीश कोरलेला असून त्याच्या उजव्या हातात सोटा (लकूट) आणि डाव्या हातात अक्षमाला दाखवलेली आहे. शेजारी उमामहेश्वरांची मूर्ती कोरलेली आहे.
या संदर्भात देऊळवाडा (ता. भांदक, जि. चंद्रपूर) इथल्या शैव गुंफांचा उल्लेख करणे आवश्यक आहे. येथील दोन गुंफांमध्ये अनुक्रमे नरसिंह आणि देवी यांच्या मूर्ती प्रतिष्ठित केल्या असल्या तरी एका गुंफेत शिवलिंगाची प्रतिष्ठापना करण्यात आलेली आहे. या गुफा निश्चितपणे वाकाटककालीन आहेत. कारण एका गुंफेत शंखलिपीत मजकूर कोरलेला असून प्रवेशद्वाराच्या एका बाजूला एक मानवाकृती कोरलेली आहे. ती निश्चितपणे वाकाटककालीन आहे.
ज्याप्रमाणे बौद्ध आणि शैव गुंफा या काळात कोरण्यात आल्या त्याचप्रमाणे गौराळा (भांदक) येथील सप्तमातृकेची गुंफाही कोरण्यात आली आहे. गौराळा (भांदक) येथील या गुंफेच्या दर्शनी भागात शिवलिंग कोरलेले असून आत गुंफेमध्ये दोनतीन माणसे उभी राहू शकतील एवढीच जागा आहे. गुंफा नऊ फूट लांब, पाच फूट रुंद आणि सात फूट उंच आहे. गुंफेच्या आतल्या बाजूस तिन्ही भिंतींना स्पर्श करणारे एक मोठे पीठ असून पाठच्या भिंतीस लागून मूर्ती ठेवण्यासाठी चार खोबणी केल्या आहेत. तर पूर्व आणि पश्चिमेकडील भिंतीत दोनदोन खोबणी केलेल्या आहेत. पीठाची वेदी वाकाटक काळातील वेदीप्रमाणे असून मध्यभागी उठावात गणांच्या मूर्ती कोरलेल्या आहेत.
▲ विंझासन गुंफेचा आराखडा
बाहेरील बाजूस गणाची एक सुटी वाकाटककालीन मूर्तीदेखील आढळते. गुंफेतील भिंतीवर त्रिविक्रम, शेषशायी, नृवराह अशा मूर्ती अर्ध उठावात पण वेगळ्या शैलीत कोरण्यात आलेल्या आहेत. यावरुन राष्ट्रकूट काळात तिचा वैष्णव गुंफा म्हणून वापर करण्यात आला हे स्पष्ट दिसते. पण शैव गुंफांचे सप्तमातृका आणि कार्तिकेय यांच्याशी असलेले जवळचे नाते लक्षात घेता ती शाक्त गुंफा शैव तीर्थस्थानाचा भाग असावी, यात शंका नाही. ज्या लहानशा टेकडीवर ही गुंफा आहे त्यावर एक हेमाडपंती मंदिरसुद्धा असून मंदिराकडे जाणाऱ्या वाटेवर एका राजपुरुषाची सुटी प्रतिमा ठेवलेली आढळते. टेकडीला लागून असलेल्या तलावाचे गौराळा हे नावसुद्धा सूचकच आहे. गौऱ्यालय म्हणजे गौरीचे निवासस्थान. याचेच ते अपभ्रष्ट रूप आहे.
भटाळा येथे एका ऋषींचा तलाव म्हणून ओळखला जाणाऱ्या लहानशा तलावाकाठी जवळजवळ २७ गुंफा कोरलेल्या आढळून आल्या. त्या गुंफांचे वैशिष्ट्य असे की त्यामध्ये केवल नरसिंहाच्या प्रतिमा कोरलेल्या किंवा पीठावर शिवलिंगे प्रतिष्ठित केलेली मुख्यत्वे आढळून केली. एके ठिकाणी सूर्याची प्राचीन, उभी प्रतिमासुद्धा आढळली. या सर्व गुंफा आदिवासींच्या परंपरेप्रमाणे अगदी लहान म्हणजे दोन चौ. मीटर व एक मीटर उंच ते अर्धा चौ. मीटर व तीस से. मी. उंच एवढ्याही आहेत. केवलनरसिंहाची उपासना वाकाटक काळात इतकी प्रभावी झाली होती की अशा लहान (साधारण अर्धा फूट उंचीच्या सुट्या) प्रतिमा विदर्भात अनेक ठिकाणी सापडल्या आहेत. आणि त्यामुळे ही नरसिंहाची उपासना चंद्रपूर, गडचिरोलीच्या जंगलातसुद्धा पोचली होती हे या लहान गुंफावरून सिद्ध होते.
पौनी येथील स्तूपाचे उत्खनन दोन मौसमात (१९६९-७० ते १९७०-७१) केल्यानंतर उत्खननाचा वृत्तांत तयार करताना स्तूपाच्या दगडी कठड्यावर कोरलेल्या दानलेखांतील विशेषनामांचा अभ्यास आणि त्या निमित्ताने समकालीन धार्मिक स्थितीचा परामर्श घेण्याचे काम प्रा. शां. भा. देव यांनी माझ्यावर सोपवले होते. सालबर्डी येथील बौद्ध गुफांची त्याकाळात मला कल्पना नव्हती. याउलट वाकाटक काळातील जे काही अवशेष सापडले होते (उदा. रामटेक आणि पवनार) ते वैष्णवच होते. नंदिवर्धन शाखेतील वाकाटक राजे हे परमभागवत किंवा परममाहेश्वर असल्यामुळे व बौद्ध मूर्ती अथवा अवशेष अपवादानेच सापडत असल्यामुळे आम्ही या निष्कर्षांप्रत आलो होतो की राजे हिंदू असल्यामुळे विदर्भात बौद्ध धर्माला ओहोटी लागली असावी किंवा तो वाकाटककाळात नामशेष झाला असावा. परंतु देऊळवाडा, भिवकुंड आणि इतर ठिकाणच्या आदिवासी शैलीची छाप असलेल्या लहान गुंफांच्या स्थापत्याचा अभ्यास केला असता असे लक्षात आले की पाशुपत आणि सात्वत संप्रदायांचा प्रसार बौद्ध धर्माचा अंगीकार केलेल्या आदिवासीमध्ये झपाट्याने झाला असावा. चंढाळा येथील बौद्ध लेणीचे छत बृहदश्मयुगीन चूलतवा स्वरूपाच्या स्मारकाप्रमाणे गोलाकार दगडी तळी ठेवून करण्यात आले होते. तर मृतांचे अवशेष ठेवण्यासाठी कोरलेल्या आदिवासीच्या गुंफाचा उपयोग शिवालय म्हणून वाकाटक काळात केल्याचे दिसून येते. वाकाटक काळात आदिवासीच्या अटवी राज्यात घडून आलेल्या नागरीकरणाचा हा परिणाम आहे असेच म्हणावे लागते. गडचिरोली येथील लक्कामेटा येथील विटांच्या वास्तू आणि भटाळा, देऊळवाडा आणि भांदक येथील नरसिंह गुंफा या नवीन परिवर्तनाच्या साक्षी आहेत असेच म्हणावे लागेल.
हैद्राबादमध्ये १९४८ साली 'पोलीस अॅक्शन' झाल्यानंतर मुंबई राज्याची पुनर्रचना झाली. राज्यातील पुराभिलेख खात्याला निजामाच्या मुलखातून अधिकारीवर्ग व अनेक संरक्षित स्मारके जोडण्यात येऊन एक नवे पुराभिलेख व पुरातत्त्व विभाग असे खाते निर्माण झाले, व ते पुरात्तत्त्वाच्या दृष्टीने एक महत्त्वाचे पाऊल ठरले. १९६० साली राज्याची पुनर्रचना होऊन त्यात मध्य प्रांतातील विदर्भ हा नवा प्रशासकीय विभाग निर्माण झाला. त्याचबरोबर मध्यप्रांताच्या राजधानीतील, म्हणजे नागपूरमधील, १०० वर्षांहून प्राचीन असे 'मध्यवर्ती संग्रहालय' हे पुरातत्त्व विभागाचा भाग बनाले. या राज्य पुनर्रचनेचा असाही एक परिणाम मूलचेरा येथील लंबगोलाकृती बांधकामाची रचना
झाला, की नागपूर ही दुसरी राजधानी झाल्यामुळे विधानसभा आणि विधान परिषदेचे हिवाळी अधिवेशन नागपूर येथे डिसेंबर महिन्यात घेण्याची प्रथा सुरू झाली. १९७७ साली संचालक म्हणून पुरातत्व व वस्तुसंग्रहालय विभागाचा कार्यभार स्वीकारल्यानंतर मी विदर्भातील आठ जिल्ल्यांचे सर्वेक्षणाचे कार्य उत्साहाने हाती घेतले. त्यातूनच रामटेक येथील वाकाटक मंदिरे, पवनार येथील शिल्पे, भांदक व आसपासच्या भागातील गुंफा, सालबर्डी, गोगाव, नगरधन, मनसर, पेच नदीवरील धोबीगोटानाला येथील पुरावशेष, पातूर येथील गुंफा या एरवी दुर्लक्षित असलेल्या पुरास्थळांचा व अवशेषांचा अभ्यास नव्याने परत हाती घेण्यात आला. त्यातून अनेक देवालये, शिल्पे, म्हणजे वाशिमला वाकाटकांची नाणीही हाती आली. विदर्भ विभागातील सहाय्यक संचालक (पुरातत्त्व), तंत्रसहाय्यक, जतन साहाय्यक व छायाचित्रकार यांच्या चमूमध्ये मोठे उत्साहाचे वातावरण निर्माण झाले होते. हिवाळी अधिवेशनाच्या निमित्ताने मला बरेच दिवस नागपुरात रहाणे आवश्यक असल्याने अधिकारी वर्ग म्हणजे पद्माकर मुळे, वेरुळकर, दासरवार व दोन छायाचित्रकार म्हणजे भाऊ आणि जुनघरे यांच्यारी मोठ्या उत्साहाने, नव्याने लागलेल्या शोधांची चर्चा होत असे. आज मला नेमके वर्ष आठवत नाही, परंतु त्या वर्षीच्या हिवाळी अधिवेशनात विधानसभेत मोठे तंग वातावरण निर्माण झाले होते. गोंड राजदेशाचा वारसा असलेल्या धर्मराव आत्राम यांना नक्षलवाद्यांनी पकडून पळवून नेले होते. नक्षलवाद्यांच्या शोधामध्ये महसूल आणि पोलीस खाते गर्क होते. अशा भीतीच्या वातावरणात सर्व शासकीय अधिकाथांना परिपत्रकाद्वारे पूर्वसूचना देण्यात आली होती, की त्यांनी ग्रामीण व त्यातल्या त्यात जंगली भागांत दौरा करताना मुलकी व पोलीस विभागाचे साहाय्य घ्यावे यावे. नागपूर कार्यालयातील त्यावेळचे तंत्र साहाय्यक बोरकर यांनी अशी बातमी आपणाली की आताच्या गडचिरोली जिल्ह्यातील तालुक्याचे ठिकाण असलेल्या धानोरा था गावापासून पाच-सहा किलोमीटर अंतरावर लक्कामेटा या ठिकाणी विटांनी बांधलेल्या, वाकाटककालीन वास्तूंचे `अवशेष एका टेकडावर आढळले आहेत. गडचिरोली जिल्ह्यात मूलचेरा येथे (तालुका- चामोरोशी) आणि तेथूनच जवळ एक-दोन मैलावर विवेकानंदपूर येथेही असेच अवशेष आढळल्याने त्या ठिकाणी, नागरा येथील उत्खनन संपल्यानंतर, हे काम हाती घ्यावे, असा कार्यालयातील सर्वांचाच आग्रह होता, या नव्या बातमीमुळे त्याबद्दलचा उत्साहही वाढला होता, नब्धा परिपत्रकाप्रमाणे चंद्रपूर, गडचिरोली या भागात नक्षलवाद्यांचे प्रस्थ असल्यामुळे, चंद्रपूर येथील जिल्हाधिकारी व पोलीस सुपरिटेंडेंट यांना, दौरा हाती घेण्याआधी, वर्दी देणे भाग होते. भेट घेतल्यानंतर जिल्हाधिका-यांनी परिस्थितीचे गांभीर्य समजावून सांगितले, आणि पोलीस अधीक्षकांच्या मदतीने व सल्ल्याने दौरा करा, अशी सूचना केली. पोलीस अधीक्षकांनी पर्यवेक्षकांनी अर्थातच जंगलात दौरा असल्यामुळे गणवेशातील नाही, तरी साध्या वेषातील पोलीसबरोबर असल्यास चिंता रहाणार नाही, असे सुचविले. बोरकर हे गडचिरोलीचेच मूळ रहिवासी, व त्या भागात सतम दौरा करणारे, काही झाले तरी पोलिसांना बरोबर घेऊ नका, म्हणजे नक्षलवाद्यांना आपल्याविषयी शंका येणार नाही, असे बबेरकरांचे मत. बोरकरांनी प्रथम जवळच्या वनाधिकाथांच्या घरी जाऊ व तेथून पुढे लक्कामेट्याला पोहोचण्यासाठी त्यांची मदत घेऊ, त्यांना जंगलाची पूर्ण माहिती असल्यामुळे आपण इच्छितस्थळी सुरक्षितपणे पोहोचू, असे आश्वासन दिले.
मांढळ येथील उत्खननात आढळलेले वाकाटककालिन विटांचे बांधकाम
वनाधिकाथांनी आमचे स्वागत केले आणि आपली चार विश्वासातली माणसे दिली. वनखात्याच्या कार्यालयापर्यंतचा प्रवास जीपनेच झाला. परंतु पुढे मात्र आम्ही पायीच गेलो. सुमारे तीन-चार कि. मी. चालल्यानंतर आम्हाला ते ठिकाण गवसले. विटांचे अवशेष असलेले ते टेकाड पुराणे असले तरी आम्हाला अपेक्षा होती त्याप्रमाणे ओसाड नव्हते. टेकाडावर दोन-तीन ठिकाणी आदिवासींची कुटुंबे आली होती. काही धार्मिक कार्यक्रम बालू होता. बोरकरांनी त्यांच्यापैकी एका वृद्ध माणसाला विचारले असता त्याने सांगितले की हे आमचे धार्मिक ठिकाण असून इथे पूजेसाठी आम्ही फार लांबून आलो आहोत. थोडे बारकाईने निरीक्षण केले असता बांबूच्या काड्यांना सप्तरंगाच्या पताका लावून ते झेंड्यासारखे रोवले होते. याविषयी विचारले असता तो म्हणाला, की यातील सहा झेंडे, पाच पांडव आणि त्यांची आई कुंती हिचे असून सातवा झेंडा भगवान कृष्णाचा आहे. त्यांना पूजा घातल्याने संकट, रोगराईचा नाश होतो. आणि म्हणून वर्षातून एकदा तरी आम्ही त्यांचा आशीर्वाद घेण्यासाठी इथे येतो. या जागेचे नाव लक्कामेटा आहे. या ठिकाणी आपली आई कुंती हिच्याबरोबर पाच पांडव इथे राहाण्यासाठी आले होते. दुष्ट दुर्योधनाने हे घर लाखेचे बांधले होते. त्याला आग लावल्यानंतर भगवान कृष्णाने त्यांना त्याहून वाचविले. झोपडी बांधताना लाखेचा वापर केल्यामुळे ही सगळी टेकडीच, झोपडी जळाल्यानंतर लाल रंगाची झाली आहे म्हणून आजही आम्ही त्याला 'लक्कामेटा' असे म्हणतो.
विटांनी बांधलेल्या वाकाटककालीन वास्तूंचे स्पष्टीकरण देणारी आदिवासींची कथा ऐकल्यानंतर आम्हा सर्वांनाच मौज वाटली. त्यातील महत्त्वाची गोष्ट म्हणजे 'महाभारत'सारख्या महाकाव्यातील कथा आणि आख्याने आदिवासींच्या, त्यातल्या त्यात पूर्व विदर्भातील गोंड आणि इतर जमातींच्या धार्मिक परंपरा आणि श्रद्धा यांचा भागच झाल्या आहेत. एवढेच नाही, तर हे आदिवासी त्यात पूर्णपणे समरस झाले आहेत, असे दिसते. तीजनबाईचा नागरा येथील शिवमंदिरात महाभारतातील आख्यानावर कीर्तन-निरूपणाचा संगीतमय कार्यक्रम पाहिला-ऐकल्यानंतर त्याविषयी आमची खात्री झाली होती, परंतु लक्काभेटा येथील अनुभवानंतर त्याला आणखी दुजोराच मिळाला. प्राचीन भारतीय इतिहासाची पुनर्रचना करताना पुरातत्त्वाची जोड देणे आवश्यक आहे, यात शंका नाही.
परंतु अशी जडणघडण करताना मानववंशशास्त्राची मदत घ्यावी लागेल, हेही स्पष्ट होते. इतिहासपूर्व काळातील (प्रोटो हिस्टोरिक पीरियड) व पूर्वइतिहास काळातील (अर्जी हि स्टोरिकल पीरियड) सांस्कृतिक जीवन जाणून घेण्यासाठी पुरातत्त्वविद्येत एक नवी शाखाच उभारली गेली आहे. तिचे नाव आहे एथ्नो-आर्किऑलॉजी, आदिवासींच्या धार्मिक, सामाजिक, परंपरा व त्यांचा आर्थिक इतिहास जाणून घेतल्याशिवाय भारतीय समाजाच्या सांस्कृतिक इतिहासाचे आकलन होणे शक्य नाही. हीच गोष्ट लक्कामेट्यांच्या अनुभवानंतर आमच्या लक्षात नव्याने आली.
विदर्भ या जनपदाचे नाव विद्वानांना अगदी ब्राह्मण ग्रंथाच्या काळापासून माहीत आहे. वैदर्भि कौण्डिण्य हे नाव तसेच विदर्भजनपदातील श्वान त्यीच्या निर्भय आणि आक्रमकपणासाठी प्रसिद्ध होते. येथील कौण्डिण्यपूर नगर हे रुक्मिणीच्या स्वयंवरामुळे, नलदमयंतीच्या कथेमुळे, तसेच रघुकुळातील अजराजाची पत्नी इंदुमती हिच्यामुळे रामायण- महाभारतामध्ये सुप्रसिद्ध होते. वेगळ्या शब्दांत गंगाखोन्यातील नागरीकरणाच्या प्रक्रियेत आर्य संस्कृतीचा विन्ध्यापलीकडील जो प्रसार आहे त्यामध्ये विदर्भ हा मोठा दुवा होता. डॉ. अमरेन्द्र नाथ यांनी अडम येथे केलेल्या उत्खननामुळे विदर्भातील मानवी संस्कृतीच्या निरनिराळ्या टप्प्यांचे रेखीवपणाने चित्रण करता येते. यावरून असे लक्षात येते की प्रागैतिहासिक काळातील आंतर अश्भयुगापासून (मेसो लिथिक म्हणजे इ.स.पू. २००० व अगोदर पासून) ते सातवाहनानंतर उदयास आलेल्या महरठीच्या काळापर्यंतचा (म्हणजे इ.स. २५०) सांस्कृतिक आलेख पाच अवस्थामध्ये झाला, हे लक्षात येते. त्यातील पहिला कालखंड, यामध्ये मानवाने अजून मातीची भांडी करण्याची कला हस्तगत केलेली नहती. दुसरा कालखंड हा ताम्रपाषाणयुगाचा म्हणजे इ. स. पू. १५०० ते १००० इतका होता. तर तिसरा कालखंड हा बृहदश्मयुगाचा म्हणजे इ. स. १००० ते ५०० इतका होता. चौथा कालखंड हा मौर्यपूर्व ते मौर्यकाळाचा म्हणजे इ.स. पूर्व. ५०० ते १५० इतका होता, तर पाचवा कालखंड हा भद्र, सातवाहन आणि महरती यांच्या कारकीर्दीच्या समकालीन, म्हणजे इ.स. पू. १५० ते इ.स. २५० इतका होता. वेगळ्या शब्दात गंगाखो-यातील नागरीकरणाची प्रक्रिया जरी बरीच आधी सुरू झाली असली तरी विदर्भातील अडम येथील तिच्या पाऊलखुणा इ.स. पू. ५०० च्या आधी जात नाहीत, चंद्रपूर जिल्ह्यातील देवटेक येथील अशोककालीन शिलालेख हे स्पष्टपणे दाखवितो की विदर्भ हा उत्तर आंध आणि कर्नाटक याप्रमाणेच मौर्य साम्राज्याचा एक भाग होता.
वाशिम येथील विटांच्या बांधकामातील लंबरौलाकृती रचना
पवनी येथील स्तूपावरून मौर्यकाळात विदर्भातील नागरीकरणाच्या प्रक्रियेने या भागात आपले पाय पक्के रोवले होते, ही गोष्ट स्पष्ट होते. तसेच पूर्व विदर्भ हा गंगाखोच्यातील कौशाम्बी (प्रयाग) व वाटेतील निषध देशाच्या मागे विदर्भातील कौंडिण्यपूर येथे पोहोचत होता. तेथून तो पवनी येथील बौद्ध संधाराभची वस्ती ओलांडून आजच्या चंद्रपूर गडचिरोलीतील झाडीतून (या भागातच देवटेक येथे मौर्य शिलालेख सापडला आहे) आंध्रप्रदेशात अमरावतीपर्यंत पोहोचत होता. मौर्यकाळात विदर्भ जनपद मौर्य साम्राज्याचा भाग होते, हे देवटेक (जिल्हा-चंद्रपूर) येथील शिलालेखामुळेच सिद्ध होत नाही, तर मालविकाग्निमित्र या शुगराजा अग्निमित्र याच्या चरित्रावर आधारलेल्या कालिदासाच्या नाटकावरूनही हे लक्षात येते. अग्निमित्रा (इ.स.चे २ रे शतक) च्या काळात विदर्भावर राज्य करणान्या सामंतांच्या घराण्यातील दोन राजपुत्रांनी गादीवर हक्क सांगितल्याने अग्निमित्राने सैन्य पाठवून ही बंडाळी शामवली; आणि दोघा भावात सलोखा निर्माण करून वर्धा नदीच्या पूर्वेस आणि पश्चिमेस त्यांना राज्य करावयास सांगितले. तेव्हापासूनच वरदा नदीच्या पलीकडील तटावर असल्यामुळे पश्चिम विदर्भाकडील भाग 'वरदातट' म्हणजे 'वन्हाड' म्हणून ओळखला जात असावा. तर नंतरच्या काळात पूर्व विदर्भाला तेथील धनदाट अरण्यामुळे 'झाडिमंडळ' असे नाव मिळाले. या भागातूनच अधि प्रदेशातील हिन्यांच्या खाणीसाठी मार्ग जात असल्याने महाभारतकाळात त्याला 'वजाकर' (हिन्यांची खाण) असे नाव मिळाले. हा हैद्राबाद संस्थानामधील भाग वाकाटक काळात वाशिम येथून राज्य करणाऱ्या विन्ध्यशक्ती द्वितीयाच्या (इ.स.चे ४ थे प्रपंच करण्यामागील हेतू असा की, आंध्रप्रदेश आणि गंगाखोरे यांच्यामधील दळणवळणासाठी विदर्भशतक) राज्यात मोडत होता. हा सर्व हा दुवा होता, आणि सातवाहन काळापर्यंत हा दुवा पक्का झालेला होता. या गोष्टीचे प्रत्यंतर आपल्याला विटामधील बांधकामाच् पुराव्यावरूनसुद्धा लक्षात येते. अमरावती येथील जगप्रसिद्ध स्तूपाची बांधणी एका विशिष्ट तंत्राने करण्यात आली. शक्य तितक्या कमी विटांचा वापर करून आकाराने मोठा स्तूप बांधावयाचा झाल्यास स्तूपाच्या पोटामध्ये उभ्या-आडव्या भिंती बांधून कूप तयार करावयाचे, व त्यासभोवती विटांची गोल भिंत बांधून मधले चौकोनी खड्डे माती व विटांचे भंगार टाकून ती जागा भरून काढायची या तत्त्वाचा वापर करून मौर्य-शुंगकाळात पवनी येथील दोन स्तूप बांधण्यात आले. हेच तंत्र वापरून सातवाहन काळात 'तेर' येथील स्तूप बांधण्यात आला होता. अशाच तंत्राचा वापर अमरावती (जग्गरथ्यपेट्ट) येथील स्तूपात करण्यात आला असल्याने, हे तंत्र विदर्भातूनच नात गेले असावे, असा विद्वानांचा कथास आहे. उत्तरेत वायव्य सरहद्द प्रति आणि अफगाणिस्तान येथील प्राचीन स्तूपातही हे तंत्र वापरले असल्याने, व्यापारी मार्गामार्फत हे तंत्र दक्षिणेत पोहोचले असावे. जाता जाता हे सांगावयास हरकत नाही, की महाभारताच्या सभापर्वातील धर्मराजाला निरनिराळ्या राजांनी आणलेल्या नजराण्यांच्या माहितीवरून मौर्य शुरकाळात निरनिराळ्या जनपदात तयार होणारा व्यापारी माल व तो ने-आण करणा-या सार्थवाहांचे दळणवळण याविषयी डॉ. मोतीचंद्र यांनी फारच उपयोगी असे निष्कर्ष काढले आहेत. आणि त्या निष्कर्षांना
मुलचेरा येथील लंबगोलाकृती बांधकामाची रचना
परंतु नंतरच्या काळात गावकथांनी खोदलेल्या खनुचामुळे हे अवशेष अगदी ध्वस्त स्वरूपात सापडले. त्यामानाने विवेकानंदपूर येथील विटांच्या देवळाचे अवशेष बन्या अवस्थेत सापडले असे म्हणता येईल. हे लंबगोलाकार देऊळ दक्षिणोत्तर ६.४० मी. लांब, व पूर्व-पश्चिम २.४० मी रुंद आढळले. याच्या भिंती ६५ सें.मी. इतक्या रुंद होत्या. या मंदिराचे अवशेष त्याच्या पायाच्या वर सापडलेले नाहीत. परंतु त्याच्या बांधणीचा थोडा सूक्ष्म अभ्यास केला असता असे लक्षात आले की सर्वांत खाली एका विस्तृत भागावर जांभ्या दगडाच्या मुरुमाचा एक थर घालण्यात आला होता. त्यावर मुरबाड मातीतच बसविलेले दगड, गोटे आणि चिपीच्या आणखी तीन भिती आणि त्या चिकण मुरमाड मातीत घट्ट बसवलेल्या होत्या, यावर विटांच्या तीन गोलाकार भिती रचण्यात आल्या. त्या एकात एक तीन होत्या. आतील भित ५८ से.मी. रुंद तर बाहेरील ७५ सें.मी. रुंद होती. या एकात एक असलेल्या तीन भिंतींना लहान लहान भिंती नीट जोडून कूप करण्यात आले होते आणि ते माती आणि विटकरीचा भराव टाकून भरण्यात आले होते. वेगळ्या शब्दात पवनी येथील मोठ्या स्तूपाच्या बांधकामात जे तंत्र वापरण्यात आले होते, त्याचाच मूलचेरा, विवेकानंदपूर या ठिकाणी वापर करण्यात आला होता, अशाच पायावर पुढे हे लंबगोलाकृती (ओव्हल) देवालय उभारण्यात आले होते. पाथावर निरनिराळ्या ठिकाणी खांब रोवण्यासाठी छिद्रे निर्माण केली होती. लंबगोल गर्भगृहाच्या सभोर मुखमंडप होता, अंतराळ नव्हते. अंतराळ नसलेले मंदिर बांधण्याची प्रथा मांढळ येथील बोगीहुडकीच्या व वन्हाडी तलावा वरील व देवळात यानंतरच्या काळात वापरल्याचे आपण पाहिले आहेच, मगधातील अशा प्रकारच्या प्राचीन लखगोलाकृती देवळांचा काळ विद्वानांनी इ.स. चे पहिले-दुसरे शतक इतका जुना मानलेला आहे. येथील विटांचा आकार व विटांची घडण इतर प्राचीन वाकाटक काळातील मंदिरात वापरलेल्या विटांप्रमाणेच विटांची असल्याने ही देवळे तिसथा शतकाच्या उत्तरार्धात अथवा चौथ्या शतकाच्या सुरवातीस बांधली गेली असावी आणि विदर्भातील वाकाटककालीन सर्व, प्राचीन देवळे म्हणून ती गणता येतील,
विटीच्या बांधकामात वापरलेल्या तंत्रावरून तसेच अशा प्रकारचे बांधकाम झाडीमंडळाच्या अगदी खोलवरच्या प्रदेशात आढळल्याने गंगा खोऱ्याातील नागरीकरणाची प्रक्रिया समृद्ध व्यापारी मार्गाच्या मार्फत आदिवासींच्या प्रदेशात किती प्रभावीपणाने पसरली होती, हे गडचिरोली जिल्ह्यातील उत्खननावरून सहज लक्षात येते आणि त्याचबरोबर पूर्वेतिहास काळातील सांस्कृतिक इतिहासाची जडणघडण करताना निरनिराळ्या जनपदातील आर्थिक हितसंबंध व त्यातील आदिवासींचा सहभाग या बाबींचा विचार केल्याशिवाय प्राचीन सांस्कृतिक जीवनाचे चित्रण पूर्ण होणार नाही, ही बाब अधोरेखित होते.
response.lokprabha@expressindia.com
नागपूरच्या उमरेड तालुक्यात नागपूर शहरापासून आग्नेयेस ७५ कि. मी. अंतरावर मांढळ हे गाव आहे. ते एकदम प्रसिद्धीच्या झोकात एका वेगळ्याच कारणामुळे आले. शेतकरी आपली बचत राष्ट्रीय बचत योजनेखाली पोस्टात भरतात. 'या खेड्याने १९७४-७५ साली मोठा विक्रम केला. महाराष्ट्रातील सर्व खेड्यांमध्ये बचत म्हणून येथील गावकऱ्यांनी ठेवलेली रक्कम विक्रमी ठरली गाव मिरचीच्या उत्पादनात बरीच वर्षे अग्रेसर होते.- गाळ्या सरपंचाच्या घरी त्यांच्य निमंत्रणावरून उत्खनन शिबिरातील आम्ही सर्व जण चहासाठी गेलो होते. सरपंचांचे घर कुठे आहे, असे विचारले असता, "जिये बबंधकाम चालू असेल ते सरपंचांचे घर 'असे उत्तर मिळाले. उत्तर गमतीदार मिळाल्यामुळे "तुम्ही असे का म्हणता?" असे विचारले असता गावकऱ्याने उत्तर दिले, "त्यांच्या घरी बारा महिने बांधकामच चालू असते." नाश्ता आटोपल्यावर चहा आला, सहज काही चौकशी करावी म्हणून "या वर्षी पीकपाणी कसे आहे" असे विचारले असता "या वर्षी जरा नुकसानच झाले, असे ते म्हणाले ""किती?" म्हणून प्रतिप्रश्न केला
असता "असेल दीड दोन, लाख !' असे ते सहज म्हणाले. आमच्या लक्षात आले की आजच्याही काळात मोढळ हे गाव तितकेच समृद्ध आहे, जितके ते प्राचीन काळात होते.
... वाकाटककालीन देवालयं
पुरातत्त्वदृष्ट्या मांढळ या गावाचे महत्त्व मात्र तिथे सापडलेल्या चार प्राचीन मूर्तीच्यामुळे अभ्यासकांच्या लक्षात आले. १९७४ साली जुलै महिन्यात महाराष्ट्र शासनाच्या वनखात्याने वनीकरणाचा कार्यक्रम हाती घेतला होता. गावाच्या जवळच असलेल्या भोलाहुडकी या टेकडीवर वृक्षारोपणासाठी खड्डे खणत असतांना वालुकापाषाणात कोरलेल्या चार प्राचीन मूर्ती सापडल्या. त्यात एक अष्टमुखी आणि दुसरी चतुर्मुखी अशा शिवाच्या दोन मूर्ती होत्या. वर्तमानपत्रात त्यांची छायाचित्रेही प्रसिद्ध झाली होती. या मूर्ती मातीने माखलेल्या असल्या तरी, त्या कोरण्याच्या शैलीवरून गुप्तकाळातील मूर्तीशी साम्य दाखविणाऱ्या होत्या. त्यामुळे त्या वेळचे नागपूर विद्यापीठातील प्राचीन भारतीय इतिहास संस्कृती व पुरातत्त्व या विभागाचे प्रमुख डॉ. अजयमित्र शास्त्री यांच्यासमवेत आम्ही सर्व अध्यापक भोलहुडकीला भेट देण्यासाठी मांढळ येथे गेलो. मूर्ती स्थानिक लाल वालुकाश्मात (सॅण्ड स्टोन) कोरलेल्या होत्या. मूर्ती अष्टमूर्ती शिवाची होती. मूर्ती प्रमाणबद्ध असली तरी एखाद्या शिवगणासारखी ठेंगणी वाटत होती. अधोवस्त्र विकच्छ पद्धतीने नेसले होते. मूर्ती दोन हातांची, परंतु एक हात खांद्यापासून तुटलेला असल्यामुळे घेतलेल्या आयुधांची नीट कल्पना येत नव्हती. धडावर चार दिशांना तोंडे असली तरी प्रत्येक मांडीवर एक याप्रमाणे आणखी दोन तोंडे व उरलेल्या हाताच्या दंडावर एक, अशा रीतीने एकूण सात मुखे होती. निखळलेल्या बाहूवरसुद्धा आणखी एक तोंड असावे, असे धरले तर शिवमूर्तीवर एकूण आठ मुखे होती, हे सहज लक्षात येते. दुसरीही शिवाचीच मूर्ती होती. या मूर्तीचा गुडघ्यापासून खालचा भाग तुटलेला होता. मूर्ती चतुर्मुख. शिरावर जटा, पण त्या एका कापडी वेष्टनात बांधलेल्या. 'दोन हातापैकी' उजव्या हातात तिरपा धरलेला दण्डा. मूर्तीच्या वरून सहज हे लक्षात आले, की चेहरेपट्टी गुप्त काळातील उभट चेहऱ्यापेक्षा जास्त चौकोनी वाटत होती, पण डोळे भुवया आणि डोक्यावरील जटा ज्या रीतीने दाखविल्या होत्या त्यावरून त्या आदि-गुप्त काळातील म्हणजे चौथ्या शतकातील मूर्तीशी अधिक जवळीक दाखवितात.

दोन मोसमांमध्ये प्राचीन भारतीय इतिहास संस्कृती व पुरातत्त्व या विभागाने मांढळ येथे तीन ठिकाणी उत्खनन केले. पैकी भोलाहुडकी व बोंगीहुडकी या दोन टेकड्यांवर विटांत बांधलेली देवालये मिळाली. बोंगीहुडकीवरील देवालय एका मोठ्या (११.७० x १४.७० मीटर) अशा प्रशस्त चौथऱ्यावर बांधले असून, सांची येथील क्र. १७ च्या मंदिराप्रमाणे ते गाभारा व समोर उघडा, आडवा मण्डप (म्हणजे शिल्पशास्त्राच्या परिभाषेत समोर वीथी) असलेला आहे. या देवालयाचे वैशिष्ट्य असे की चौथरा ३२ थरांचा आहे. व्यावहारिक दृष्टीने पाहिले तर या ठिकाणी देवालय बांधावे अशी ती जागा नाही. उंच सखल भाग असलेला आणि काही ठिकाणी सुळके असलेला तो खडक आहे. नेमक्या याच ठिकाणी देऊळ बांधण्याचे काही वेगळे कारण असावे. एकूण विन्यासावरून हे येथील सर्वात प्राचीन देऊळ असावे. १९७५-७६ आणि ७६-७७ या शेजारच्या भोलाहुडकीवरील अवशेष पाहता ते एक साधे देऊळ नसून देवालय संकुल असावे, असे वाटते. उत्खननात आणि साफसफाईत लक्षात आलेल्या अवशेषांवरून मुख्य देवळाभोवती एक कुंपणाची भिंत असावी. आग्नेयेला एक विटात बांधलेली जलद्रोणी, वायव्येस दोन कक्षही होते. ते बहुधा देवळातील अर्चकासाठी असावे. देऊळ एका अठरा मीटर लांब अशा आयत, पूर्व पश्चिमेला लांब चौथऱ्यावर होते. उत्तर व दक्षिणेस, चौथऱ्यावर जाण्यासाठी पायऱ्यांची सोय होती. आणि एका बाजूस एका देवळीची मांडणी होती असे दिसते. ह्या देवालयातील सर्वात महत्त्वाचे अवशेष दोन प्रकारचे. एक म्हणजे चौथऱ्याच्या एका बाजूला मोकळ्या जागेत खड्डा खणून त्यात काहीशा खंडित अवस्थेतील दहा देवप्रतिमा आढळल्या. त्यातील आठ शैव-शाक्त असून, दोन वैष्णव म्हणजे एक विष्णूची खंडित आवक्ष प्रतिमा आणि दुसरी बलरामाची शिरोविहीन प्रतिमा. उरलेल्या प्रतिमा एका हातात कमळाचे फूल घेतलेली गणासारखी प्रतिमा, एक चतुर्मुख ब्रह्मा, द्वादशमुख शिव, तपस्यामग्न पार्वती (अपर्णा), सिंहासन म्हणता येईल अशा पीठाच्या चार कोपऱ्यांवर सिंह असलेली दुर्गेची प्रतिमा, नैगमेष. यातील प्रतिमाविज्ञानदृष्ट्या वर्णन न आढळणारी एकमेव प्रतिमा म्हणजे दोन बाहू व दोन मांड्यांवर मिळून चार मुखे आणि धडावर चार मुख्य दिशांना व त्यावर चार विदिशांना अशी जटाजूट असलेली शिरे. विद्यापीठाच्या संग्रहालयात या मूर्तीची नोंद 'महासदाशिव' म्हणून केलेली आहे. सदाशिव हा चार किंवा पाच शिरे असलेली महादेव. त्याला दहा हात असतात. उत्तर काळात बंगालमध्ये वीस बाहू असलेल्या सदाशिवमूर्तीची पूजा प्रचारात होती. या नेहमीच्या सदाशिवमूर्तीपेक्षा जास्त शिरे असलेली, आणि वेगळी असल्याने तिला एक नवीन कल्पित - महासदाशिव असे नाव दिले. सुप्रसिद्ध प्रतिमाल क्षणतज्ज्ञ नीलकंठ पु. जोशी यांनी मूर्तीला बारा शिरे असल्याने द्वादशज्योतिर्लिंगांना जवळ जाणारी यामागे काही तरी कल्पना असावी असे अनुमान काढले. डॉ. गो. बं. देगलूरकर यांनी, महाभारतात 'द्वादश' असे शिवाचे बिरुद असल्याने, या मूर्तीची ओळख 'द्वादश' अशी केली. मूर्तीच्या या वेगळ्या लक्षणाची उकल गृह्यसूत्रातील शूलगव या यज्ञातील विधीमुळे होऊ शकते, असे आम्हांस वाटते. गाईगुरांमध्ये रोगाची लागण होऊन ती मृत्युमुखी पडल्यास, शरद किवा वसंत ऋतूमध्ये आर्द्रा नक्षत्रावर रुद्रशिवाला शांत करण्यासाठी हा यज्ञ करावा असे म्हटले आहे. यज्ञात बळी दिलेल्या सांडाच्या १२ आहुती रुद्रशिवाच्या १२ नावांना उद्देशून द्याव्यात, असेही म्हटले आहे. एरवी रुद्र ह्या गणदेवता असून रुद्राच्या ११ नावांचा उल्लेख येतो. त्यामुळे रुद्राला ११ हा आकडा प्रिय असून रुद्राला अभिषेक करावयाचा झाल्यास श्रावणमासात अकरा वेळा रुद्रसूक्ताचा मंत्रपाठ केला जातो. ह्यालाच हल्लीच्या भाषेत एकादशिनी (एकादशनी) असे म्हणतात. परंतु वरील शूलगव यज्ञात मात्र रुद्राच्या १२ नावांचा उल्लेख प्रथमच येतो. वाकाटकांच्या परंपरेत वैदिक यज्ञांचे अनुष्ठान अभिप्रेत असल्याने ही द्वादशमुखी मूर्ती शूलगाव यज्ञाच्या अनुष्ठानाच्या वेळी प्रतिष्ठित केली असावी असे वाटते.
शिवाच्या वेगळ्याही काही मूर्ती येथे आढळतात. याचा वर उल्लेख आला आहेच. त्यांमध्ये अष्टमूर्ती व चतुर्मुख, काष्ठधारी लकुलीशमूर्ती यांचा अंतर्भाव आहे. त्यावर आत्ताच काही टीकाटिप्पणी करावी असे आम्हांस वाटत नाही. शिवाची आणखी एक उल्लेखनीय मूर्ती म्हणजे त्याने हातात चाप-बाण घेतलेली, डोक्यावर जटाबंध, आणि कपाळावर तिसरा डोळा असलेली रौद्र मूर्ती होय. काही जाणकारांनी वरील लक्षणांवरून तिची 'ईशान' किंवा 'त्रिपुरान्तक' अशी ओळख पटविली आहे. या संदर्भात असे म्हणता येईल, की ह्या मूर्ती घडविल्या गेल्या तो काळ (चौथ्या शतकाचा मध्य, अथवा पृथ्वीषेण प्रथम अथवा रुद्रसेन प्रथम यांचा काळ) लक्षात घेता, अजून प्रतिमाल क्षणे पोथिनिविष्ट झालेली नव्हती. आणि त्यामुळे आचार्य अथवा कलाकार यांच्या आगमपरंपरेच्या जाणिवेतून अशा प्रकारच्या आद्यमूर्ती घडल्या असाव्यात असे म्हणता येईल. राणी प्रभावतीगुप्ता, रुद्रसेन द्वितीय व पृथ्वीषेण द्वितीय यांचा अपवाद वगळता वाकाटक घराण्यातील सर्व राजे स्वतःचा उल्लेख 'परममाहेश्वर' असा करतात. यावरून ते पाशुपत संप्रदायाचे अनुयायी असावेत असे वाटते. या विचाराच्या अनुषंगाने शैव आगम-पुराणातील कथांचा आणि प्रतिमालक्षणांचा संदर्भ देऊन या महाराष्ट्रातील आद्य शैव मूर्तीची ओळख पटविली पाहिजे.

या संदर्भात तेथील देवी मूर्तीचाही विचार करणे आवश्यक आहे. त्यातील विशेष उल्लेखनीय मूर्ती म्हणजे तपस्यामग्न उमा-अपर्णा व सिंहासिनाधिष्ठित दुर्गा. दुर्गा महिषमर्दिनी हा अवतार मार्कण्डेय-पुराणाच्या द्वितीय चरित्रात असून महाकाली, महासरस्वती व महालक्ष्मी यापैकी सत्त्वगुणाचा आविष्कार असलेल्या महालक्ष्मीने महिषासुराचा वध केला, अशी कथा आहे. महालक्ष्मी म्हणजे तिच्याबरोबर तिचाच आविष्कार असलेल्या सप्तमातृकाही येतात. त्यांच्या मूर्ती उत्खननात मिळाल्या नसल्या तरी त्यांची पूजा दुर्गा महिषमर्दिनीबरोबर अपेक्षित आहे. उदयगिरी येथील विशालकाय वराहमूर्तीच्या शेजारी एक शिवगुंफा आहे. त्या गुंफेच्या बाह्यांगावर महिषासुरमर्दिनीची मूर्ती कोरली आहे व अंगणात सप्तमातृका व स्कन्द यांचा शिलापट्ट उघड्यावर कोरला आहे. याचा अर्थ पाशुपत संप्रदायात महिषासुरमर्दिनी आणि सप्तमातृका यांच्या पूजेचा अंतर्भाव होता. पातुर (जिल्हा-अकोला) येथील शैव गुंफेचाही उल्लेख करणे आवश्यक आहे. गुंफेचे दोन भाग त्या कमीत कमी रुद्रसेन द्वितीयच्या असून एका भागात पीठावर तपस्यामग्न उमेची प्रतिमा असून दुसऱ्या भागात शिवलिंग व आता जीर्ण शीर्ण झालेला लांबलचक मूर्तिशिलापट्ट आहे. तो सप्तमातृकांचा असावा. यावरून मांढळ येथेही पाशुपत संप्रदायाचेच देऊळ असावे, याची खात्री पटते. सिंहासनाधिष्ठित दुर्गा ही पाशुपत संप्रदायाचाच भाग असावी परंतु सोबत मिळालेल्या नैगमेषाच्या मूर्तीमुळे या ठिकाणी लज्जागौरीची उपासनाही स्वतंत्रपणे अथवा संप्रदायाचा भाग म्हणून असण्याची शक्यता नाकारता येत नाही. मात्र ह्या संदर्भात हे नमूद करणे आवश्यक आहे, की वेरूळ येथील रामेश्वर गुंफामध्ये (क्रमांक २१) तपस्यामग्न उमा व सप्तमातृका, स्कन्दाचा सहचर नैगमेष आणि लज्जागौरी या सर्वांच्या प्रतिमा स्पष्टपणे लाकुल पाशुपत संप्रदायाशी निगडित असलेल्या महाराष्ट्रातील सर्वात प्राचीन शैवप्रतिमा मांढळ येथेच सापडल्या आहेत हे निश्चित! निखात प्रतिमांच्यामध्ये विष्णू आणि बलराम यांच्या प्रतिमाही महत्त्वाच्या आहेत.
▲ मांढळ येथे सापडलेले पुरावशेष
काळातील आहेत. ह्या अनुमानाला दुजोरा देणारा, आणखी एक पुरावा म्हणजे रुद्रसेन द्वितीयच्या मांढळ येथील एका शेतात सापडलेल्या ताम्रपटात त्याने श्रीमोंद (मुण्ड?) स्वामी या शेषशायी नारायणाप्रीत्यर्थ भूमिदान केल्याचे नमूद केले आहे. भोलाहुडकीवरील देवालय जर पाशुपत संप्रदायाचे म्हणजे शिवालय असेल, तर बोंगीहुडकीवरील यापूर्वी उल्लेखिलेले देवालय हे वैष्णव किंवा सात्वत संप्रदायाचे असावे असे वाटते व सापडलेल्या दोन वैष्णवमूर्ती त्या देवळात प्रतिष्ठित असाव्यात.
मांढळ हे एक महत्त्वाचे पाशुपत आणि सात्त्वत संप्रदायाचे केंद्र होते. ह्या दोन्ही संप्रदायांना राजाश्रय होता, हे शिव देवालयाच्या जवळच सापडलेल्या तीन ताम्रपटावरून अधोरेखित होते. येथील उत्खनित खड्ड्यांच्या दुसऱ्या थरातच प्रवरसेन द्वितीय व त्याचा नातू या दोघांचे ताम्रपट एका मातीच्या करंड्यात व्यवस्थित रीतीने पुरून ठेवले होते. थोडक्यात सांगावयाचे झाल्यास भोलाहुडकी आणि बोंगीहुडकीवरील देवालय शैव आणि वैष्णव संप्रदाय व कलेतिहास व प्रतिमालक्षण या दृष्टीने महत्त्वपूर्ण आहेत. या आद्य वाकाटक शिल्पांचा जवळजवळ चार पिढ्यांचा (पृथ्वीषेण प्रथमपासून पृथ्वीषेण द्वितीयपर्यंतचा) इतिहास समजण्यासाठी मांढळ येथील पुरावशेषांचा उपयोग होणार आहे.
मांढळ येथील देवालयांच्या विषयींचे विवेचन वहाडी तलावाच्या काठावरील शिवदेवालयाचे वर्णन केल्याशिवाय पूर्ण होणार नाही. ह्या वहऱ्हाडी तलावाविषयीची एक दंतकथाही प्रसिद्ध आहे. एक लग्नाचे वहऱ्हाड मुक्कामासाठी येथे थांबले असताना, तलावातील देवतेने विनंतीनुसार त्यांना स्वयंपाकासाठी भांडी परत करण्याच्या बोलीवर दिली. नंतरही अशा प्रकारचा प्रत्यय मुक्काम करणाऱ्या मंडळींना आल्याचे स्थानिक लोक सांगतात, तलावाच्या काठावर पश्चिमाभिमुख, गाभाऱ्यात ४४.४८ सेंटिमीटरच्या चौकोनी (म्हणजे ब्रह्मकान्त) भागावर असलेले १.२२ मिटर इतके उंच शिवलिंग मिळाले. या शिवलिंगात अष्टकोनी विष्णुभाग नसल्याने हे पाचव्या शतकाच्या पूर्वीचे, याची निश्चित कल्पना होती. मंदिराचा तलविन्यास असा - गर्भगृह ८.४० x ७.२० मीटर लांब रुंद, त्यापुढे ४.६५ लांब व २.३० मीटर रुंद असुन मुखमण्डप व देवळात समोर देवळात शिरण्यासाठी दोन भिंतीमध्ये असलेला पायऱ्यांचा जिना आहे. देवालयाच्या भिंतीजवळ जवळ दिड मीटर रुंद असून उत्खननात अवशिष्ट राहिलेल्या भिंतीची उंची जवळजवळ दिड मीटर इतकी होती. ह्या शिवालयाचे वैशिष्ट्य असे की विटांच्या भिंतींना बाहेरचा थर वालुकाश्माच्या चिऱ्यांचा होता. हे देवालय वाकाटककालीन असल्याची खात्री सोबत सापडलेल्या एका प्रतिहारीच्या शिल्पावरून व दगडी भिंतीच्या एका चिऱ्यावरील वृषभशिल्पाच्या शैलीवरून पक्की झाली. समोरचा पायऱ्यांचा जिना, आणि गाभाऱ्याच्या भिंतीची, दगडी आणि विटांच्या अशा, दोन थरात केलेली विभागणी सोडली तर देवालयाचा विन्यास सांची येथील समुद्रगुप्तकालीन मंदिर क्र. १७सारखाच आहे, हे ह्या संदर्भात नमूद करणे आवश्यक आहे. व त्यामुळे हे मंदिर इ. स.च्या चौथ्या शतकाच्या मध्याइतके जुने असावे असे म्हणणे वावगे ठरणार नाही. दुसरी नमूद करण्याजोगी गोष्ट म्हणजे देवळाच्या बाहेरच्या बाजूस चार कोपऱ्यांवर आणि पायऱ्यांच्या शेवटी दोन्ही बाजूस मुखमण्डपात शहाबादी फरश्यांचे तुकडे खांबासाठी तळखडे (आधार) म्हणून ठेवले आहे. याचा अर्थ असा की त्यावर उभ्या केलेल्या लाकडी खांबावर मुखमंडपाचे व कदाचित प्रदक्षिणापथाचे छप्पर असावे. शहाबादी दगडाचा वापरही सातवाहन काळातील स्थापत्य परंपरांचे सातत्य दाखवितो. मंदिराभोवती एका दगडी भिंतीचे अवशेष आढळले. ही भिंत यादवकाळात उभारलेली दिसते. यावरून निदान यादवकाळापर्यंत हे देवालय पूजेत असावे असे दिसते.
विद्यापीठातील चमूने उत्खननाआधी मांढळ गावाची पाहणी केली होती. त्यावेळी ग्रामस्थांनी आमच्या निदर्शनास आणले की, शाळेची इमारत मोठी करताना पायासाठी खणलेल्या खड्ड्यात अनेक पुरावशेष सापडले. त्यानंतर वसाहतीचे अवशेष ह्या ठिकाणी आहेत, हे लक्षात आल्याने उत्खननासाठी काही खड्डे खणले असता, सातवाहन काळातील नाणी, मातीची भांडी, गृहोपयोगी वस्तू व किमती खड्यांचे मणी असे अनेक पुरावशेष मिळाले व ही वस्ती वाकाटक काळात सुद्धा येथे नांदत होती, हे वरच्या थरातील अवशेषांवरून व त्यातल्यात्यात मातीच्या भांड्यावरून व रोमन बनावटीच्या झारींची नक्कल करणाऱ्या लाल झारींच्या खापरावरून लक्षात आले. मिळालेल्या नाण्यात एक क्षत्रपांचे नाणेसुद्धा सापडले.
▲ मांढळ येथे सापडलेले पुरावशेष
विष्णु
रुद्रसेन द्वितीयच्या पाचव्या राज्यसंवत्सरात दिलेला ताम्रपट हा वाकाटकांच्या राजकीय इतिहासाच्या जुळणीच्या दृष्टीने जितका महत्त्वाचा आहे, तितकाच तो सात्त्वत धर्माच्या विदर्भातील मुहूर्तमेढीच्या आणि प्रसाराच्या दृष्टीनेही अर्थपूर्ण आहे. त्या ताम्रपटाची सुरुवात नेहमीच्या सिद्धम् आणि दृष्टम् या शब्दांनी केली असून, देव देव म्हणजे देवांचा देव असलेल्या मोंदस्वामीच्या संदेशावरून हा ताम्रपट आम्ही देत आहोत, असे म्हटले आहे. ताम्रपटाचा उद्देश स्वतःच्या "धर्म, आयुष्य, बल, विजय, ऐश्वर्य, यात वाढ व्हावी, आणि इहपारलौकिक हितासाठी" अरग्राम नावाचे खेडे वत्सगुल्म येथील श्री आर्य सात्त्वत शाखेतील आचार्यांचा निवास असलेल्या दोन मठांना (अधिवास) नव्याने देत आहोत. येथे राहणाऱ्या स्वतःच्या अध्ययनात पूर्णपणे रमून गेलेल्या, निरनिराळ्या गोत्र आणि शाखांतील ब्राह्मणांना अग्रहारामध्ये अपेक्षित असलेल्या मर्यादा त्यांनी पाळाव्यात व तसेच त्यांना बहाल केलेल्या नियमातील सुटी आणि अधिकार त्यांनी भोगावे, असे आम्ही जाहीर करतो. ज्या देव देव मोंदस्वामीच्या आज्ञेने हे गावाचे दानपत्र देण्यात आले, त्याचे वर्णनही आरंभीच दिले आहे. "सर्व जगाचा प्रलय झाल्यानंतर त्याला व्यापून टाकणाऱ्या जलधीच्या अफाट पाण्यावर ज्याने आपले सर्व शरीर मोकळेपणाने पसरवून टाकलेले आहे, अशा नागराज अनन्ताच्या डौलाने उभारलेल्या विशाल फणांच्या छायेत जो योगनिद्रेसाठी पहुडला आहे आणि ज्याने शंखचक्र आणि खड्ग ही लांच्छने धारण केली आहेत, असा मोंदस्वामी. या वर्णनावरून हे स्पष्ट आहे, की मोंदस्वामी हे नारायणस्वरूप असलेल्या स्थानिक शेषशाई विष्णूचे नाव असावे, संपादकद्वय शास्त्री व चंद्रशेखर गुप्त यांच्या मते देवतेचे नाव जवळच असलेल्या 'मोंद' ह्या स्थलनामावरून पडले असावे. (उदा. जसे रामगिरि-स्वामिन् म्हणजे रामगिरी ह्या टेकडीवरील तिची अधिष्ठात्री देवता.) विद्वान संपादकांचे असेही मत आहे की, आजही मांढळच्या जवळ असलेले 'डोंगरमौदा' हे स्थलनाम म्हणजेच प्राचीन 'मोंद' असावे. मात्र सुचविल्याप्रमाणे शोध घेतला असता मांढळच्या आसपास किंवा डोंगरमौद्याजवळ वर वर्णन केलेली शेषशाई विष्णूची मूर्ती मिळालेली नाही. आता पुरता निष्कर्ष काढावयाचा झाल्यास वत्सलगुल्म येथील ब्राह्मणांचा वास असलेल्या आर्य सात्त्वत संप्रदायाच्या दोन मठिका व मोंदस्वामींचे देवालय हे दानपात्र देण्यापूर्वीच अस्तित्वात होत्या. दुसरे असे की वत्सगुल्म ही पश्चिम विदर्भातील वाकाटकांची राजधानी आपल्या माहितीनुसार या शाखेचे वंशजही, ते स्पष्टपणे तसा उल्लेख करीत नसले तरी, माहेश्वर संप्रदायाचेच होते, असे मानण्याइतका पुरावा उपलब्ध आहे. वाशिम येथील ८०-९० च्या दशकात राज्य पुरातत्त्व विभागाने हाती घेतलेल्या उत्खननात उघडकीस आलेली विटांची देवळेही शिवालयेच होती, असे लक्षात आले आहे. ह्याचा अर्थ असा की, कदाचित राजाश्रयाविनाही पश्चिम विदर्भात सात्त्वत धर्माची मुहूर्तमेढ रोवली गेली होती. समकालीन गुप्त शिलालेखावरून सात्त्वत धर्माचा प्रसार उत्तरेत पंजाबात आणि पूर्वेस प्राचीन मगधापलीकडेही झाला होता, हे निश्चित! सर्व गुप्त सम्राट हे परमभागवत असल्यामुळे असे घडले असल्यास नवल नाही. परंतु दक्षिणापथातील सात्त्वत धर्माच्या अस्तित्वासंबंधीचा उल्लेख सर्वात प्राचीन आहे, हे नमूद केले पाहिजे. विदर्भातूनच पुढे हे सात्त्वत संप्रदायाचे लोण कुंतल (दक्षिण महाराष्ट्र व उत्तर कर्नाटक) आणि आंध्र प्रदेशातून तामिळनाडूत गेले असावे.
खोनिगेन (इंग्रजीमध्ये ग्रोनिंगेन) येथील प्राच्यविद्या संस्थेत संस्कृतचे प्राध्यापक म्हणून काम करणारे हान्स बाक्कर हे १९९० पासून वाकाटक आणि त्यांच्या प्रतिमाविज्ञानावर (Iconology) काम करीत आहेत. राज्य पुरातत्त्व विभागाने केवल नरसिंह मंदिरात शोध लावलेल्या प्रभावतिस्वामिन्संबंधीच्या शिलालेखावर संशोधन करून आपल्या सहकाऱ्यासमवेत अनेक समाधानकारक वाचन पर्याय सुचविले. बाबरी मशिदीच्या प्रसंगानंतर राम आख्यायिकांच्यावर त्यांचे अनेक पैलू लक्षात घेऊन संशोधन करणाऱ्यांपैकी ते एक आहेत. वाकाटक राजे आणि जनमानसातील राजसंस्थे विषयीच्या कल्पना याविषयीही त्यांनी लिखाण केले आहे. मांढळ येथील रुद्रसेन द्वितीयच्या ताम्रपटाच्या निमित्ताने गुप्त-वाकाटक काळातील संप्रदाय-सहिष्णुतेविषयी त्यांनी काही विचार प्रकट केले आहेत. डॉ. मायकेल विलिस यांनी उदयगिरी येथील गुंफांवर संशोधन करून तेथील गुंफांत कोरलेल्या देवतांचा आणि पौराणिक, धार्मिक विधी आणि आचार यांचा संबंध कसा असतो, हे दाखविलेले आहे. त्यांच्या संशोधनाच्या फलितांपैकी एक महत्त्वाचा निष्कर्ष म्हणजे गुप्त सम्राट (उदा. परमभागवत चंद्रगुप्त द्वितीय) हे स्वतः वैष्णव असले तरी शैव-पाशुपत संप्रदाय, जैनधर्म व बौद्धधर्माबाबत सहिष्णू होते, एवढेच नव्हे तर या धर्मांना त्यांचा उदार आश्रय होता. विदिशेपासून ५ किमी अंतरावर असलेल्या दुर्जनपूर येथे चंद्रगुप्ताचा मोठा भाऊ रामगुप्त याने करविलेल्या तीन जैन मूर्ती सापडल्या आहेत.
उदयगिरी येथे एक गुंफा पार्श्वनाथाची म्हणून प्रसिद्ध आहे. तर जवळच सांची येथील बौद्धविहाराला चंद्रगुप्त द्वितीयच्या एका अधिकाऱ्याने दान दिल्याविषयीचा शिलालेख आहे. हाच धागा उचलून बाक्कर यांनी वाकाटक नृपतींचासुद्धा प्रत्यक्षपणे शैव आणि सात्वत या दोन्ही संप्रदायांना उदार आश्रय होता, हे नव्याने परत सांगितले. वत्सगुल्म शाखेतील राजेही स्वतः माहेश्वर असले तरी त्यांच्या राजधानीतच सात्वत संप्रदायाच्या दोन मठिका होत्या; आणि अजिंठा येथे तर हरिषेणाचे सामंत उपेंद्रगुप्त (ऋषीकजनपद), अश्मक सामंताच्या प्रधानाचा मित्र असलेला भिक्षु व माथुरक श्रेष्ठी आणि त्याचा स्वतःचा मुख्य प्रधान वराहदेव यांनी जे बौद्धविहार निर्माण केले, ते भारतीय बौद्धकलेचेच नाही, तर त्या काळातील स्थापत्य शिल्प व चित्रकला यांचे जगातील सर्वोत्कृष्ट नमुने समजले जातात. प्रत्यक्ष लेखी पुरावा नसला तरी अजिंठा येथील लेणी क्र. १ आणि २ हरिषेणाच्याच प्रेरणेने आणि आश्रयाने कोरली गेली असावीत, अशी वॉल्टर स्पिक यांची खात्री आहे. त्यासंबंधीचा परिस्थितीजन्य पुरावाही ते सादर करतात. मांढळ येथील ताम्रपटातील पुरावा अशा प्रकारच्या युक्तिवादाला दुजोराच देतो, असे बाक्कर यांचे म्हणणे आहे. शास्त्री आणि चंद्रशेखर गुप्त यांनी केलेले मोंदस्वामिन् हे वाचन चुकीचे आहे; देवतेचे खरे नाव मुण्डस्वामिन् असे वाचले पाहिजे; मुण्डस्वामिन् म्हणजे मुण्डास्वामिन्, 'मुण्डा' हे प्रभावतीगुप्तेचे विवाहपूर्व नाव असून या नावाचा केवलनरसिंह देवालयातील शिलालेखात उल्लेख येतो, अशी काही त्यांची ठाम मते आहेत. तिच्या प्रेरणेनेच मांढळ येथे मुण्डस्वामिन्चे देवालय रुद्रसेनाने बांधले व तिचा पिता चंद्रगुप्त द्वितीय याने उदयगिरी येथे प्रस्थापित केलेली सर्व-संप्रदाय-सहिष्णुतेची नवीन राजनीती या देवालयाच्या निमित्ताने प्रभावतीगुप्तेने सुरू केली. आणि त्यामुळेच मांढळ येथे मोठ्या शिवालय संकुलामध्ये वासुदेव-संकर्षणांचे देऊळ होते, कदाचित ह्याच संकुलात मुण्डस्वामिन्चे देऊळ असावे. परंतु आज त्याचा पुरावा मात्र मिळत नाही असा कयास त्यांनी केला आहे.
हा सर्व प्रपंच करण्याचा कारण असे की, त्या काळात संप्रदायांमध्ये तात्त्विक पातळीवर मतभेद असले तरी कलह नव्हते; वातावरण सामंजस्याचेच होते. अगदी अशोकाच्या काळापासूनच सर्वधर्मसमभावाचे धोरण भारतीय समाजात अमलात आणले गेले आहे. परंतु मध्ययुगातील सामंतशाहीचा पुरस्कार करणारे काही पुरातत्त्वज्ञ असे मानतात की, आर्थिक तंगीमुळे सामाजिक आणि राजकीय जीवन कलुषित झाले होते. आणि त्यामुळे मध्ययुगात सामाजिक विषमता, निम्न स्तरातील जातींचे शोषण आणि सांप्रदायिक तेढ यामुळे समाज ग्रस्त आणि त्रस्त झाला होता. या सर्व सामाजिक बदलाची नांदी गुप्त-वाकाटक काळातच झाली असे ते हिरिरीने मांडतात. मुंण्डस्वामीन् की मोंदस्वामीन् असे तपशिलातील फरक बाजूला ठेवला तरी, या सामंतशाहीवादी पुरातत्त्वज्ञ व इतिहासकारांनी बाक्कर यांच्या मताची दखल घ्यावी, एवढेच या निमित्ताने त्यांना सांगणे आहे.
response.lokprabha@expressindia.com
महाराष्ट्र शासनाने १९७६ साली नव्यानेच पुनर्रचित केलेल्या पुरातत्त्व व वस्तुसंग्रहालय विभागाच्या संचालकपदाची जाहिरात दिली होती. मी त्यावेळी नागपूर विद्यापीठात प्राचीन इतिहास संस्कृती व पुरातत्त्व विभागाचा अधिव्याख्याता म्हणून काम करीत होतो. विभागाचे प्रमुख प्रा. शां. भ. देव यांच्या सल्ल्यावरून मी त्या पदासाठी अर्ज केला, काही काळानंतर मुलाखतीसाठी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचे निमंत्रण आल्यावरून आम्ही साताठ उमेदवार मुंबई येथे हजर झालो. त्यावेळी लोकसेवा आयोगाचे कार्यालय हायकोर्टासमोरील बैंक ऑफ इंडियाच्या वरच्या मजल्यावर होते. आयोगाचे अध्यक्ष आणि सदस्यांव्यतिरिक्त विषयाचे तज्ज्ञ म्हणून प्रख्यात पुरातत्वज्ञ प्रा. ह. धी. सांकलिया व शिक्षण खात्याच्या सचिवांचे प्रतिनिधी म्हणून प्रिन्स ऑफ वेल्स म्युझियमचे संचालक सदाशिव गोरक्षकर तिथे होते. माझा पुरातत्त्व विषयाचा अनुभव मुख्यत्वे विदर्भातीलच असल्याने प्रा. सांकलिया यांनी सुरवातीच्या काही प्रश्नानंतर मला सूचकपणे विदर्भातील इतिहासकालीन नव्या पुरास्थळाचा तुम्हाला शोध करता आला का, असा प्रश्न विचारला. प्रा. सांकळियांना काय अभिप्रेत होते, याची माला कल्पना नव्हती. १९६९-७१ साली पवनी येथील मौर्य-सातवाहन काळातील बौद्ध स्तूपाचा शोध लागला होता व विद्यापीठाच्या पुरातत्त्व विभागाने, भारतीथ पुरातत्त्व सर्वेक्षणाच्या नागपूर येथील उत्खनन शाखेच्या सहकार्याने काम करून बौद्ध पुरातत्त्वाच्या दृष्टीने महत्त्वाचे शोध लावले होते. महाराष्ट्राच्या पुराभिलेख व पुरातत्त्व विभागाच्या संचालकांनी विदर्भातील एका अत्यंत प्राचीन नगरीमध्ये शोध घेऊन विदर्भातील नागरीकरणाची प्रक्रिया शुंगमौर्यकाळाच्या पलिकडेही जाते, हे सिद्ध केले होते. शिलालेखातून माहित झालेल्या पूर्व विदर्भाची राजधानी असलेल्या प्रक्रपूरची ओळख देव आणि ढवळीकर यांच्या जोडीने १९६६-६८ च्या दरम्यान पवनार येथे केलेल्या उत्खननातून आधुनिक पवनारशी पटविली होती. येथील धाम नदीच्याकाठी असलेल्या परमधाम या विनोबाजींच्या आश्रमाच्या जवळपास असलेल्या टेकाडावरील उत्खननात वाकाटककालीन महत्त्वाचे पुरावशेष सापडले होते व जोडीला महाभारत-रामायणामधील प्रसंगावर आधारित शिल्पे व 'गंगा-भगवती' असा पेटिकाशीर्षब्राह्मीत लिहिलेला मजकूर असलेली गंगेची मूर्ती सापडल्याने वरील तर्काला बळकटी मिळाली होती. या शिल्पावर १९४८ साली म. म. मिराशी यांनी एक विस्तृत लेख इंग्रजीत लिहून पुढीलप्रमाणे तर्क व्यक्त केला होता. ही शिल्पे निश्चितपणे प्रवरसेन द्वितीयची आई, महाराणी प्रभावतीगुप्ता हिच्या आग्रहावरून राजाने बांधलेल्या श्रीरामाच्या मंदिराला शोभा देत असावीत. आपल्या विष्णुभक्तीचे निदर्शक असे परमभागवत हे बिरुद ती नेहमी आपल्या नावामध्ये लावत असे, 'रामगिरिस्वामिन्' असे बिरुद असलेल्या रामटेकवरील देवतेच्या मूतीच्या पायापाशी बसून दानपत्राची आज्ञा करण्याची प्रथा प्रवरसेन द्वितीयच्या काळात होती. ही देवता दुसरी तिसरी कुणी नसून श्रीरामच असावी असे मिराशींचे मत झाले होते. व हे मंदिर ही आपली माता प्रभावतीगुप्ता हिच्या आग्रहानुसार द्वितीय प्रवरसेनने रामटेक येथे बांधले असावे व अभिलेखातील 'रामगिरिस्वामिन पादमूलात्' या शब्दप्रयोगामुळे वर कयास व्यक्त केला, त्याप्रमाणे मूर्तीच्या पायाशी बसून तिथून दानपत्र दिले, असा अर्थ न करता शब्दशः श्रीराममंदिरात अधिष्ठानावर पूजेअर्चेसाठी ठेवलेल्या पादुकांशेजारी बसून दानपत्र दिले जात असे, असा अर्थ महामहोपाध्यांनी केला आणि रामटेक जवळील नदिवर्धन (म्हणजे हल्लीचे नगरधन) येथील पारंपरिक राजधानी हलवून ती प्रवरपुर म्हणजे हल्लीचे पवनार (जिल्हा वर्धा) इतक्या दूर नेल्याने हे नवीन राममंदिर प्रवरसेनाला बांधावे लागले असावे, असा निर्वाळा त्यांनी दिला.
वाशीम येथील १९९२ मधील उत्खननामध्ये सापडलेल्या अवशेषांचे रेखाटन.
प्रा. सांकलिया यांचा रोख या पार्श्वभूमीबरोबरच १९७५-७७दरम्यानच्या दोन मौसमात, मांढळ येथे विद्यापीठाच्या पुरातत्त्व विभागाने केलेल्या उत्खननावरही होता. भी त्यांना सहजपणे असे उत्तर दिले की हो, वाशीम येथे इंगळे यांच्या शेतात व आजूबाजूला पाचसहा एकर इतक्या जागेत मला वाकाटक-सातवाहनकालीन खापरे, मणी व मातीच्या बाहुल्या असे पुरावशेष सापडले असून ते प्रसिद्ध वत्सगुल्म या नगराच्या वसतिस्थानाचे अवशेष असावेत. माझे उत्तर ऐकून प्रा. सांकळियांनी मोठा संतोष व्यक्त केला, कारण आत्तापर्यंतच्या उत्खनन सर्वेक्षणात्मक कार्यात पूर्व विदर्भावरच जास्त भर होता. पश्चिम विदर्भातील वाकाटक राजवंशाच्या अखत्यारीतील पुरास्थळांच्याकडे दुर्लक्षच झाले होते. वास्तविक पाहाता वाकाटक वंशाची कीर्ती आतापर्यंत काही अपवाद वगळता पूर्णपणे वत्सगुल्मशाखेतील सम्राट हरिषेण व त्याच्या दरबारातील सामंत अमात्य यीच्या आश्रयाखाली निर्माण झालेल्या अजिंठा येथील जगप्रसिद्ध लेणी व तेथील भिंतीवरील चित्रांमुळेच प्राप्त झाली होती. परंतु नमूद करण्यासारखे पुरास्थळ संशोधकांना सापडले नव्हते. खरे तर, त्यादृष्टीने प्रयासच झालेला नव्हता, वत्सगुल्म या शहराचे नाव प्रथम प्रक्रसेनाचा पुत्र सर्वसेन प्रथम याने या ठिकाणी आपली राजधानी वसविण्याच्या आधीपासूनच प्रसिद्ध होते. आणि वाङ्मयीन वर्तुळात तर एका वेगळ्या कारणासाठीच त्याचा उल्लेख केला जात होता. त्यासंबंधीची आख्यायिका अशी की सातवाहन राजा आपल्या राणी आणि अंतःपुरातील स्त्रियांसमवेत जलक्रीडा करीत असतांना त्याने गंमत म्हणून आपल्या हाताने काहीशा वेगानेच पाण्याचे फवारे राणीच्या अंगावर उडवले. त्यामुळे किने घाबरूनच 'मोदकैः सिच्यमाने।' अशी त्याची विनवणी केली. राजाने लगबगीने आपल्या सेवकाकडून लाडवांचे ताट मागविले आणि त्यांचा वर्षाव तिच्यावर करण्यास सुरुवात केली. त्यावर राणी हसू लागली. राजाला काही कळेना, म्हणून राणीने खुलासा केला की, माझ्यावर पाण्याचा शिडकाव करू नकोस (मा उदकैः स्च्यि माम्।) असे मला म्हणायचे होते- आपल्या संस्कृतच्या अज्ञानाने राजा अतिशय लज्जित झाला. आणि लवकरात लवकर आपल्याला व्याकरणशुद्ध संस्कृत यावे म्हणून त्याने दरबारातील पंडितांमध्ये त्याला सहा महिन्यांच्या आत संस्कृत संभाषणामध्ये प्राविण्य मिळविण्यासाठी शर्त लावली. गुणाढ्य या कवीने तो विडा उचलला आणि प्रतिज्ञा केली की, सहा महिन्यांत जर असे प्राविण्य राजाला अवगत झाले नाही तर मी संस्कृत भाषा वापरणे सोडून देईन. राणी त्याकाळच्या गुजरातमधील प्रसिद्ध क्षत्रप देशातील राजकन्या होती. आणि रूद्रदामनसारखे राजे त्यांच्या संस्कृत पांडित्यासाठी प्रसिद्ध होते. तर महाराष्ट्रातील सातवाहन राजे प्राकृत भाषेतच आपला राजव्यवहार करीत. इतकेच नव्हे तर प्राकृत कवींना त्यांचा उदार आश्रय होता. हाल या सातवाहन राजाने प्राकृत भाषेतील सुभाषितांचा एक संग्रहच 'गाथाकोश' हा ग्रंथ संपादित केला होता. तोच आज 'गाथासप्तशती' म्हणून प्रसिद्ध आहे. प्राकृत भाषेचा प्रभाव जनमानसावर इतका पक्का होता की, गुणाढ्य आपली प्रतिज्ञा पूर्ण करू शकला नाही व कबूल केल्याप्रमाणे त्याला वनवास पत्करावा लागला आणि त्याने आदिवासींकडून पैशाची भाषा शिकून 'वहुकः' म्हणजे नंतरच्या काळात बृहत्कथा म्हणून प्रसिद्ध पावलेल्या महाराष्ट्रातील आद्य महाकाव्याची रचना केली. या अप्रतिम काव्याचा आस्वाद घेण्याची समज आजूबाजूच्या पैशाची भाषकांमध्ये नसल्याने गुणाढ्याने आपल्या ग्रंथाचे एकेक पान वाचून अम्भिनारायणाला समर्पित करण्याचे ठरविले. ते काव्य मनाला इतके भिडणारे होते आणि प्रसंग इतका करुण होता की, पशुपक्ष्यादिसुद्धा अश्रू ढाळून आपला शोक व्यक्त करीत होते. आख्यायिका असे सांगते की, शिकारी दरम्यान मारलेली हरणेसुद्धा इतकी दुबळी झाली होती, की राजाच्या ताटात त्यांचे सुके मांस वाढण्याची पाळी राज्याच्या आचायावर आली. राजाला सर्व वृत्तांत समजल्यानंतर त्याने गुणाढ्याला आपलेच महाकाव्य नष्ट करण्याचा प्रकार थांबविण्याची विनती केली. मूळ पैशाची भाषेत लिहिले गेलेले हे काव्य आज उपलब्ध नाही. त्याची 'वसुदेवहिण्डी' म्हणून जैन मुनी संगदास गणिवाचक व धर्मसेन गणी यांनी केलेली माहाराष्ट्री प्राकृतमधील आवृत्ती 'बृहत्कथा श्लोक संग्रह' ही संस्कृतमधील आद्य व त्यापाठोपाठ 'कथासरित्सागर' ही क्षेमेंद्र कवीची 'बृहत्कथाभज्जिरी' अश संस्कृतमधील आकृत्या सर्वश्रुत आहेत. प्राचीन प्राकृत भाषेतील हालाची 'गाथासप्तशती' आणि गुणाढ्याची 'बृहत्कथा' या दोन्ही काव्यांची सुरुवातीच्या कविप्रर्शसेत बाणभट्टासारख्या संस्कृत महाकवींनी वाहवा केलेली आढळते. गुणाढ्य व प्राचीन क्सगुल्म म्हणजे आजच्या वाशीमचा रहिवासी. वत्सगुल्म हे विदर्भ जनपदात असल्यामुळे कालिदासाच्या रसाळ आणि सहजसुंदर अशा काव्यशैलीला 'वैदर्भी' असे नाव मिळाले. तर त्याच शैलीची प्राकृत काव्याची आदिजननी म्हणून वत्सगुल्म शहर प्रसिद्ध होते आणि आहे. या संदर्भात हे नमूद करणे आवश्यक आहे की, वाकाटक वंशाचा सर्वात प्राचीन म्हणून माहीत असलेला, सर्वसेन प्रथम याचा पुत्र द्वितीय विध्यशक्त्ती याचा ताम्रपट प्राकृतमधूनच दिला आहे.
वत्सगुल्म शहराची ओळख आपल्याला आणखी एक वेगळ्या रितीने मिळते. ती 'वत्सगुल्म्य माहात्म्य' या ग्रंथातून, उपपुराणाशी संबंधित असलेल्या आणि उत्तर मध्ययुगात रचलेल्या या स्थलमाहात्म्यात नेहमीप्रमाणे वत्सगुल्म हे ब्रह्मा, इंद्र इत्यादी देवतांनी गौरविलेले तीर्थक्षेत्र कसे आहे, हे जनमानसावर ठसविण्यासाठी येथील मध्यमेश्वर इत्यादी देवालयांचे वर्णन आढळते. आणि त्याअर्थी हे माहात्म्य इतर स्थलमाहात्म्यीच्यापेक्षा वेगळे नाही. या क्षेत्रातील देवतांची पूजा केली असता, अथवा तीर्थकुंडात स्नान केले असता, लौकिक आयुष्यात धनधान्यसंपत्ती आणि मरणोत्तर मोक्षप्राप्ती अशा प्रकारची ठरीब, ठाशीव वर्णनेच आढळतात. परंतु एकदा चर्चेच्या ओघात वॉल्टर स्पिंक यांनी माहात्म्यातील मध्यमेश्वर देवालयाच्या नावांमागील रहस्य सांगितले.

वाशीम येथील १९९४-९५ मधील उत्खननात सापडलेल्या लाल देऊळ परिसराचे रेखाटन
मध्यमेश्वर यातील 'ईश्वर' या उपपदावरून ते शिवदेवालय असावे, असा तर्क केल्यास ते वावगे ठरणार नाही. परंतु ते शिवाचे देवालय आहे, या पलीकडे 'मध्यम' या शब्दाला विशेष अर्थ आहे. आजच्या काळात वेळेच्या दृष्टीने पुढे पाठीमागे वेळ दर्शविताना इंग्लंडमधील ग्रीनविच हे शहर जगाच्या मधोमध आहे, असे समजून वेळ सांगितली जाते. भारतीय ज्योतिषशास्त्राप्रमाणे उज्जयिनी व श्रीलंका यांना जोडून ती मध्यरेषा तयार होते, असे मानले जाते. ती रेषा वाशिम येथूनही जात असल्याने, त्याची खूण म्हणून शिव देवालयाला 'मध्यमेश्वर' असे नाव दिले गेले. वत्सगुल्म माहात्म्याची संहिता व भाषांतर प्रकाशित झाले असले तर या दृष्टिकोनातून या स्थलमाहात्म्याचा विचार केला गेला पाहिजे, असे मत स्पिंक यांनी प्रकट केले.
माझ्या दृष्टीने अर्थातच सर्वप्रथम वाशिमच्या वसतिस्थानाची पुरातत्त्वीय दृष्ट्या सखोल पाहणी करून उत्खनन करणे, हीच महत्त्वाची गोष्ट होती आणि त्यामुळे ९१ साली इंगळे यांच्या शेतात (सर्वे नं. २५६) उत्खनन केल्यानंतर, ९३ साली किल्लारी येथील भूकंप झाल्यावर लातूर जिल्ल्यातील कामांना प्राधान्य देण्यात आले होते, परंतु १९९४-९५ साली परत हे काम डॉ. साळी यांना सुपूर्द करून सुरू करण्यात आले. पवनार अथवा पवनी येथील उत्खननाप्रमाणे किंवा मनसर-नगरधन या पूर्वेकडील राजधानीतल्या प्रमाणे वाशिम येथील उत्खननात कुठलेही भब्य अवशेष उघडकीस आले नाहीत. परंतु वास्तूंचे जे अवशेष हाती आले ते वास्तुशास्त्राच्या दृष्टीने अधिक जुने व अत्यंत महत्त्वाचे ठरले आहेत. दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे वाकाटकांची नाणी, काही नाणकशास्त्रांच्या दृष्टीने डॉ. अजयामित्र शास्त्री यांनी खासगी संग्रहातील जी नाणी बाकाटकांची म्हणून प्रसिद्ध केली ती वादाच्या भोवऱ्यात सापडली. वाकाटकांनी ती पाडली की नाही या विषयाची शंका परंतु ती इतकी जुनी आहेत की नाहीत याविषयीसुद्धा प्रश्नचिन्ह उभे केले गेले. वाकाटकांच्या नाण्यांसारखीच नाणी वाशिम येथील उत्खननात स्तरबद्ध संदर्भात सापडल्याने हा वाद आता परत उगाळण्यात अर्थ नाही, असे वाटते.
वाशीम येथील फुकटपुरा या भागात सर्वे नं २५६ मध्ये एक उमामहेश्वराची मूर्ती आणि विशालकाय शंखनिधीची मूर्ती होती. तसेच गावात इतरत्र एक महिषासुरमर्दिनीची मूर्ती पडून होती. उमामहेश्वराची मूर्ती शंकर पार्वतींचे शबर-शबरीचे रुप दाखवत असून त्यांच्या पाठीमागून डोकावणारा नदीही दिसतो. ही मूर्ती आणि शंखनिधी हे अभिजात वाकाटक शैलीत नसले, तरी राष्ट्रकूटपूर्व काळातील निश्चित होते. आणि त्यामुळेच मी त्याकडे आकर्षिला गेलो होतो. ती जमीन खासगी असल्याने इंगळे यांचे 'ना हरकत' प्रमाणपत्र घेऊन उत्खननाच्या कामास सुरुवात झाली. उत्खननातील वास्तु अवशेष सापडलेल्या देवालयाच्या जोत्याखालचेच होते. देऊळ काहीसे लंबवर्तुळाकार म्हणजे (सुमारे ९ मी. बाय ८ मी.) असे असून समोर (सुमारे ६ मी. बाय ४ मी.) असा आयताकृती मंडप आहे. मंडपातून आत जाण्यासाठी मध्ये अंतराळ असून दरवाज्याची चौकट बसविण्यासाठी सुमारे ५५ सेमी इतके विस्तृत दोन ओटे आढळले. हिंदू मंदिरामध्ये मूर्ती प्रतिष्ठित केली असल्यास आणि आतून प्रदक्षिणा घालण्याची सोय केली असली तरी मूर्तीची जागा पाठच्या भिंतीला लागून असते. याउलट या जवळजवळ वर्तुळाकार असलेल्या विटांच्या गाभायात बरोबर मध्यभागी (म्हणजे वास्तुशास्त्राच्या परिभाषेत ब्रह्मस्थानी) एक चौरस (१.८० मीटर बाय १.८० मीटर) असा विटांचा चौथरा व चार बाजूला भद्र असलेला चौकोनी खळगा आढळला, यावरून सहजपणे असे अनुमान करता येते की, या खळग्यात शिवलिंगाची प्रतिष्ठापना केली असावी. गाभा-याच्या भितीचे एकूण ११ थर असलेली विटांची मित आढळली. त्यांपैकी ६ थर तर या आक्षेपकांच्या मनात आहेच.
पीठाचे असून उरलेले ५ गाभायाच्या भिंतीचे होते. विटांचा आकार ४८ बाय २५ बाय ९ सेमी अथवा ४२ बाय १९ बाय ७ सेमी इतका होता, वाकाटक काळात याच आकाराच्या विटा वापरल्या जात होत्या, मंडपाच्या ईशान्य भागात काही नाणी सापडली ती अजयमित्र शास्त्री यांनी यापूर्वी प्रकाशित केलेल्या नाण्याशी साम्य दाखवितात. या वाकाटक नाण्यांच्या बरोबरच क्षेत्रप नाण्यांचे मातीचे २ साचेही मिळाले. वरील सर्व पुरावा लक्षात घेता हे वाकाटकांच्या सर्व प्राचीन देवळांपैकी एक म्हणजे विधशक्ती द्वितीयच्या काळातील असादे, असे वाटते. इंगळे यांच्या शेतापासून जवळच सुमारे ३०० मीटर अंतरावर जैनांच्या क्षेत्रपालांची शेंदूराने माखलेली मूर्ती असलेली एक देवळी आहे. स्थानिक लोक तिला 'लाल देऊळ' असे म्हणातात. १९९४-९५ च्या उत्खननात त्या ठिकाणी विटांच्या भितीच्या कुंपणात अत्यंत ध्वस्त स्वरुपात चार वास्तूंचे अवशेष सापडले. या ठिकाणीही लंबवर्तुळाकार असे अधिष्ठान काहीसे इंगळे यांच्या शेतातील देवळासारखेच आढळले. महत्वाचा फरक असा की मध्यभागी शिवलिंग ठेवण्याचा चौथरा या ठिकाणी सापडला नाही. परंतु या ठिकाणी क्षत्रपांची चांदीची नाणी सापडली. लक्षात येणारे मंदिराचे दोन वास्तुअवशेष या चौथऱ्याच्या नैऋत्येसच आढळले. त्यातील विशेष म्हणजे देवळाला लागूनच पश्चिमेस सुमारे ३ मीटर चौरस एक चौथरा असून त्यात मध्यभागी एक पाण्याचे कुंड आहे. देऊळ उत्तराभिमुख असून पुढे मंडप व मागे अष्टकोनी गाभारा आहे. त्याच्या मध्यभागी एक अष्टकोनी पीठ असून त्यावर कुठली मूर्ती असेल याचा अंदाज बांधता येत नाही. तेथे शिवलिंग निश्चितच नव्हते. कारण शिवदेवालये उत्तराभिमुखी कधीच नसतात. शिवलिंगाच्या अभिषेकजलाची पन्हाळ दाराच्या दिशेने असणे हे व्यावहारिक दृष्टीने सुद्धा गैरसोयीचेच ठरते. पाण्याचे कुंड शेजारी असल्याने कदाचित हे देवीचे ठिकाण असावे. येथील विटांचा आकार मात्र पूर्वीच्या देवळातल्यापेक्षा काहीसा कमीच आढळला ४० बाय १८ बाथ ७ सेमी अथवा ३६ बाय १६ बाय ७ सेमी इतकाही तो काही बाबतीत कमी आढळला. मात्र सर्वात वैशिष्टपूर्ण बाब अशी की, हे अष्टकोनाकृती देवालय वाकाटककालीन असल्यामुळे त्याप्रकारच्या देवळातील सर्वात प्राचीन असे मानावे लागेल. अशाच प्रकारचे, ज्याला हल्लीच्या भाषेत तारकाकृती म्हणता येईल असे देवालय मनसर येथेही सापडले असून त्यासंदर्भात आपल्याला पुढे चर्चा करता येणार आहे.
आतापर्यंत सापडलेले वास्तुअवशेष भव्य नसले तरी वाशीम येथील दोन मौसमात केलेल्या उत्खननाने हे सिद्ध झाले आहे की वाकाटकांच्या विटांमधील स्थापत्याची प्राचीनता इ.स.च्या चौथ्या शतकाच्या पूर्वार्धापर्यंत जाते. तैथेच विस्तृत उत्खनन केल्यास वाकाटकांच्या समृद्ध वारशाचे महत्वाचे धागेदोरे आपणास प्राप्त होतील.
मांढळ येथील उत्खननापाठोपाठ वाकाटकांचे विटांमधील स्थापत्य जाणण्याच्या दृष्टीने महत्त्वाचा शोध म्हणजे नागरा येथील उत्खननात प्राप्त झालेले शिवालयाचे अवशेष. या दोन ठिकाणच्या उत्खननात मिळालेल्या पुरावशेषांमधील फरक म्हणजे मांढळ येथे तीन ताम्रपट, देवतांच्या दहा मूर्ती, आणि विटांत बांधलेल्या देवळांच्या तीन जोती, तर नागरा येथे फक्त एका मोठ्या देवळाचे जोते आणि स्फटिकाची नामांकित मुद्रा या दोनच बाबी महत्त्वाच्या म्हणून सांगता येतील. संख्येने या दोन बाबी कमी असल्या, तरी कलेतिहासाच्या दृष्टीने नागरा येथील देवालयाचे अवशेष कसे आणि किती महत्त्वाचे आहे, याविषयी आपण नंतर चर्चा करणारच आहोत. परंतु नागरा येथील उत्खनन त्यात भाग घेणाऱ्या चमूच्या दृष्टीने एका वेगळ्याच कारणासाठी कायमचे लक्षात राहाण्याजोगे ठरले.
* नचना येथील पार्वती मंदिराचे प्रवेशद्वार
आम्ही जेव्हा असे ठरविले की एका चाचणी उत्खननानंतर भैरव टेकडीवर एक आयत उत्खनन करावे, त्यावेळी नागपूर मध्यवती संग्रहालयाचे अधिरक्षक पद्माकर मा. मुळे व मी असे दोघेही जण जीपने नागरा येथे पोहोचलो. नागरा हे गाव तसे लहान आहे, आणि त्याचा कारभार तेथील पंचायतीचे सरपंच पहात असे. सरपंचाला भेटणे आवश्यक होते. याचे कारण असे की टेकडीवर सुस्थितीत नसले तरी, गैरवाचे पाच पन्नास वर्षापूर्वी बांधलेले, पत्र्याचे छप्पर असलेले आणि त्याकाळातही पूजेत असलेले भैरवाचे मंदिर होते. डॉ. शां. सा. देव (प्राध्यापक, प्राचीन भारतीय इतिहास, संस्कृती व पुरातत्व विभाग, नागपूर विद्यापीठ) व जगत्पती जोशी, (अधीक्षक पुरातत्वविद्, भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षण, नागपूर) यांचा पवनी येथील अनुभव लक्षात घेता, स्थानिक रहिवाशांना आणि ग्रामपंचायतीला विश्वासात घेतल्याशिवाय हे उत्खनन यशस्वी होणार नव्हते. आणि म्हणूनच आम्ही (मुळे आणि मी) सरपंच यांच्यासमोर टेकडीवरील भैरव मंदिर तेथून उचलून जवळच थोड्या अंतरावर नव्याने बांधण्याचा प्रस्ताव ठेवला. सरपंच यांनी तो प्रस्ताव मान्य केला, तो एका अलिखित अटीवर, की उत्खननाच्या कामासाठी गावातल्याच तरुणांची प्राधान्याने निवड व्हावी. सांगावयास हरकत नाही, की भैरवाची भग्नमूर्ती आमचे फोटोग्राफर कम-मॉडेलर जुनघरे यांनी मोठ्या कौशल्याने सांधली, आणि पुरातत्त्व विभागाने बांधलेल्या चौथऱ्यावर तिची प्रतिष्ठापना झाली. ही बातमी हां हां म्हणता गोंदिया शहरात पसरली आणि भाविकांनी आणि दात्यांनी सुमारे ७० हजार इतकी रक्कम खर्च करून मंदिराचे बांधकाम पूर्ण केले. ही सावधानता दाखविण्यामागे शासनाच्या पुरातत्त्व विभागाचा काही व्यावहारिक हेतू होता.
नागरा येथील उत्खनन हाती घेण्याआधी भैरव टेकडीची सहकाऱ्यांसमवेत मी व मुळे यांनी पाहागणी केली होती. डॉ. एम. जी. दीक्षित (निवृत्त डायरेक्टर, डिपार्टमेंट ऑफ अर्काइव्हज आणि आर्किऑलोजी, महाराष्ट्र राज्य) यांच्या 'मध्यप्रदेश के पुरातत्व की रूपरेखा' या मौलिक ग्रंथात त्याचप्रमाणे सर अलेक्झॉन्डर कनिंगहॅम यांचे साहाय्यक बेग्लर यांच्या लिखाणातून नागरा येथील पुरा स्थळाचे (आर्किओलॉजिकल साइट) महत्व लक्षात आले होते. या ठिकाणी कुशाण कालीन अवशेष, विटात बांधलेले गोल कूप इ. वस्तू मिळाल्याचे ज्ञात होते व असाही अंदाज वर्तविण्यात आला होता की येथील गोलाकार टेकडीत स्तूपाचे अवशेष दडले असावेत. नागपूर येथील ऑफिसमध्ये होत आणि त्यामुळे उत्खननाविषयीची चर्चा नचना येथील पार्वती मंदिराची मागील खिडकी असताना पुरावशेष नोंदणी अधिकाऱ्याने विशेष उत्साह दाखवून आम्हा दोघांसमोर हे उत्खनन करण्याची संधी मिळाल्यास आपणास मोठा आनंद होईल, असे सांगितले. त्याप्रमाणे संधी मिळाल्यानंतर, त्या उत्साही नवबौद्ध अधिकाऱ्याने चुनखडीची काँक्रिट लादी सापडल्याने त्या ठिकाणी बौद्ध स्तूपच असला पाहिजे, असा अहवाल पाठवला. पुरावा जरी चुकीचा असला, तरी बौद्ध स्तूप असल्याची शक्यता नाकारता येत नसल्याने, सांप्रदायिक तेढीतून उत्खननास होणारा संभाव्य विरोध टाळण्यासाठी मंदिर सन्मानपूर्वक उतरवून गावकऱ्यांच्या संमतीने भैरवाची प्रतिष्ठापना करण्याचा प्रस्ताव आम्ही ठेवला होता. परंतु आम्हास आश्चर्याचा सुखद धक्का बसला, की त्या ठिकाणी एक वाकाट ककालीन भव्य शिवालयाचे अवशेष सापडले. या उत्खननातून आम्हाला आणखी एक अचानक लाभ असा झाला, की ज्यामुळे आम्हाला प्राचीन भारतीय नाट्य संगीत परंपरेचे एक अनोखे दर्शन घडले, ते असे- उत्खननासाठी जायचे, म्हणजे बौद्ध भिक्षूच्याप्रमाणे, प्रत्यक्ष गावात न राहाता गावठाणापासून थोड्या अंतरावर मुक्काम करुन उत्खनन शिबिराची उभारणी करायची असा प्रधात आहे. त्यासाठी आम्ही सरपंचांना विचारले असता, त्यांनी असा सल्ला दिला की गावातील शिवमंदिरात मोठ्या ओवऱ्या आहेत,
भुमरा येथील शिवालयाचा मंडय
* नचना येथील मंदिरातील रामायणाचे दृश्य
त्यातील तीन-चार खोल्यांमध्ये तुम्ही आपला कॅम्प ठेवा. इथे तुम्हाला कुठलाही त्रास होणार नाही. फक्त शिवरात्रीच्या उत्सवात तिथे पाचसहा रात्री कीर्तन-भजन जोरात चालते, परंतु तुम्ही रस घेतला तर त्याचाही आनंद लुटू शकाल. वर म्हटल्याप्रमाणे अगदी अनपेक्षितपणे पाचसहा दिक्स एका छत्तीसगडी महिलेने आपल्या बोलीत गायलेल्या महाभारत - रामायणातील आख्यानांचे साउासंगीत श्रवण आणि दर्शनही घडले. छत्तीसगडी बोलीतील रसाळ काव्य, बरोबर आलेल्या वादकांच्या साथीने, हातात एकतारा घेऊन ती गात असे. तिचे गाणे इतके अभिनिवेशाचे असे, की गाण्याबरोबरच मंचाच्या एका टोकापासून दुसऱ्या टोकापर्यंत नाचत नाचत ती निरनिराळ्या पात्रांचे संवाद स्वाभिनय फेकत जात असे. हा आमचा लाम अपूर्व होता, हे ननंतर इतरांना पटविण्यास आमचा बराच वेळ जाई. परंतु एकदा दूरदर्शनवर छत्तीसगडी लोककलेचा आविष्कार पाहताना हे लक्षात आले, की शिवरात्रीच्या यात्रेत जिने आपली कला सादर केली, ती दुसरी-तिसरी कुणी नसून संगीत-नाटक अकादमीने व राष्ट्रपतींनी पद्मा पुरस्काराने सन्मानित केलेली तीजनबाईच होती।
नागरा येथील शिवदेवालयाचे उत्खनन दोन मोसमात पार पडले उत्खननात पणत्यांच्या खापराशिवाय दुसरी कुठलीही मातीची भांडी मिळाली नाहीत. परंतु लिखित मजकुरावर सील करण्यासाठी म्हणून वापराव्याच्या स्फटिकातील मुद्रा म्हणजे आजच्या भाषेतील मुदी किंवा मुंदी सापडली. राजघराण्यातील किवा मोठ्या पदावरची माणसे अशा प्रकारची अंगठी वापरत असत. हा आपला दूत आहे, अशी सीतेला खात्री आणि ओळख पटावी, म्हणून हनुमानाला श्रीरामाने आपली मुद्रिका दिली होती, असा रामायणात उल्लेख आला आहे. नागरा येथे सापडलेल्या अंगठीवर 'नारायणो' असे नाव कोरलेले आहे. लिपी पेटिकाशीर्ष (बॉक्स हेडेड) ब्राह्मी असल्यामुळे ती अंगठी व देऊळ हे वाकाटककाळातील असावे असे निश्चित झाले. उत्खननात आता फक्त जोत्याचाच शिल्लक असलेला भाग मिळाला तो आठ फूट उंच असून त्यावरून एकूण मंदिराच्या विन्यासा (प्लान) ची कल्पना येते. एकूण जोते १४७ फूट आठ इंच बाय ८७ फूट इतके लांब रुंद असून ते पूर्वाभिमुख आहे. पाय-यांना लागून असलेले कठडे प्रत्येकी साडेसोळा फूट रुंद असून सोपानाचा भाग जवळजवळ ४६ फूट रुंद आहे. पायऱ्या चढून गेल्यानंतर थोडा भार कुठल्याही प्रकारचे बांधकाम असल्याचे दाखवीत नाही. यावर लाकडी खांब असलेला उघडा मंडप असावा, त्यामागल्या ८७ चौ. फूट भागावर गाभारा आणि भोवतालचा प्रदक्षिणापथ असावा. गर्भगृहाच्या मध्यभागी मांढळ इथल्याप्रमाणेच खड्डा असून त्यामध्ये शिवलिंग असावे. हे शिवलिंग आम्हाला वरचा भाग भग्न असलेल्या अवस्थेत उत्खननाअगोदर टेकडीवरच मिळाले होते. गर्भगृह हे १७ फूट रुंद व १९ फूट लांब ८ इंच लांब होते. आणि त्यासमोर १० फूट ५ इंच चौरस असे अंतराळ होते. गर्भगृहाची भिंत ही १४ फूट ९ इंच जाड होती आणि त्यात नंतरच्या भिंत ही १४ फूट ९ इंच जाड होती आणि त्यात नंतरच्या काळातील मंदिरांप्रमाणेच भद्र, रथ व प्रतिरथ अशी रचना होती. मध्ययुगात म्हणजे बहुधा भोसला काळात गाभाऱ्याचा भाग लक्षात ठेवून त्यावर एक शिवमंदिर बांधले असावे, हे स्पष्ट दिसत होते. या उत्तरकालीन दगडी बबंधकामामुळे क्याच ठिकाणी जुन्या बंधकामाचे अवशेष विस्थापित झाले होते. परंतु या भोसलाकालीन मंदिराच्या अवशेषांमुळे, ते पडल्यानंतर त्यावरच बांधलेल्या गैरवाच्या अर्वाचीन मंदिरामुळे हे सिद्ध झाले, की जनमानसात हे शंकराच्या देवालयाचे स्थान आहे, ही आठवण दीड हजार वर्ष उलटून गेल्यावरही पक्की होती वरचे मंदिर आज अस्तित्वात नसले, तरी विटांच्या आकारावरून जोत्याच्या भिंतीच्या अलंकरणावरून, जोत्यावरील कोनाड्यात वापरलेल्या पन्हाळीच्या खांबावरून तसेच स्तंभशीर्षाच्या ठेवणीवरून हे मंदिर वाकाटककालीन होते याविषयी शंका राहात नाही. जोते, अगोदर वर्णन केल्यापमाणे, प्लानच्या दृष्टीने तीन भागांत कल्पिलेले आहे. समोर पायऱ्या, त्याच्या बाजूला दोन लहान देवळ्या, त्यानंतर मंडपाचा भाग, १० फुटांचे अंतराळ व ८७ फूट चौरस असा गाभारा व बहुतालचा प्रदक्षिणा मार्ग असा मंदिराचा मुख्य भाग येतो. त्यापैकी जोत्याची उत्तरेची, दक्षिणेची व पाठची भिंत सरळ रेषेत नसून त्यातसुद्धा निर्गम (प्रोजेक्शन्स) आणि प्रवेश (रेसेसेस्) योजलेले आहेत. पूर्वेचा भाग सोडल्यास दक्षिण, पश्चिम आणि उत्तर दिशांना प्रत्येकी आठ निर्गम आणि सात प्रवेश आहेत. प्रत्येक निर्गम आणि प्रवेशावर वरच्या भागात दोन खांबांवर तोललेला असा कोनाडा आहे. कोनाड्याच्या खाली वेदीबंध असून सर्वात खालच्या स्तरावर पल्लवांनी सुशोभित केलेले कुंभ आहेत. तर प्रवेशाच्या ठिकाणी निर्गमाप्रमाणेच स्तर असून ते अगदी साधे म्हणजे अनलंकृत असून एकामागे एक जातात. निर्गमाचे खांब साधे चचैौकोनी (रुचक प्रकारचे) असून ते घ्छाद्य स्तरावर विसावले आहेत. तर प्रवेशातील कोनाडे हे गोलाकार किंवा वृत्ताकार असून त्यांची रचना खाली घट आणि वर घट पल्लवाचे स्तंभशीर्ष अशी असून, खांबाचा मधला भाग पन्हाळ्यांनी (फ्ल्युटेड) सुशोभित केला आहे.
भुमरा येथील शिव मंदिराचे अवशेष
गाभाऱ्याची भित आणि जमीन यांची, आधी वर्णन केल्याप्रमाणे, मध्ययुगीन मंदिराच्या बांधकामामुळे नासधूस झालेली आहे. असे असले तरी गाभाऱ्यातील शिवलिंगाची जागा, शिवलिंगावरील अभिषेकाचे पाणी वाहून नेण्यासाठी असलेल्या दगडी पन्हाळी (प्रणाल) मुळे निश्चित करता आली ही पन्हाळ उत्तरेच्या भितीतून बाहेर निघून अभिषेकाचे जल जमिनीवर असलेल्या एका कुंडात विसर्जित करीत असे. या पन्हाळीला हल्ली आपण 'गायमुख' असे म्हणतो. कारण या पन्हाळीच्या तोंडाला गायमुखाचा आकार दिलेला असतो. यापूर्वीच्या मंदिरात त्याऐवजी मगरीचे तोंड बसविलेले असे. त्यामुळे शिल्पशास्त्रात त्याचा उल्लेख 'मकरप्रणाल' असा केला जातो. त्याही पूर्वी म्हणजे इ. स. च्या चौथ्या ते सहाव्या शतकात मकराऐवजी एक आक्राळविक्राळ राक्षसी चेहरा, पन्हाळीसमोर लावण्याची पद्धत होती. याला शिल्पशास्त्राच्या परिभाषेत 'भूतप्रणाल' असे नाव आहे. अशाच प्रकारचे एक मजेदार भूतप्रणाल या देवळात बसविले होते. प्रसिद्ध कलेतिहासतज्ज्ञ डॉ. मधुसूदन ढाकी यांच्याकडे याबाबत विचारणा केली असता त्यांनी असे मत प्रकट केले की, हे अगदी वेगळ्या प्रकारचे प्रणाल असून याचा आकार अजिंठा येथे चित्रित केलेल्या नरव्यालासारखा असून, एकूण त्याची ठेवण व शैली लक्षात घेता, प्रणालाची व मंदिराची प्राचीनता इ. स. च्या चौथ्या शतकापर्यंतही जाऊ शकते. या भूतप्रणालावर बसविलेल्या राक्षसी चेहऱ्याच्या तोंडातून पाण्याचा प्रवाह, गंगानदीच्या प्रवाहाप्रमाणे बाहेर पडत असल्याची कल्पना करून, कलाकाराने एक गमतीदार चित्र उभे केले आहे. भूतप्रणालच्या धडाला लहान मुलाचे असावेत असे गुटगुटीत दोन हात आहेत. त्यापैकी एका हातात पाण्यातून बाहेर पडणारा मासा धरला असून भूत तो मासा तोंडात टाकण्याच्या आविर्भावात आहे. टेकडीच्या वरील पृष्ठभागावर उत्खननाअगोदर सापडलेले शिवलिंग मांढळ येथील तलावीच्या काठी असलेल्या शिवालयातील शिवलिंगाप्रमाणेच चौकोनी (ब्रह्मभाग) व वाटोळा (रुद्रभाग) अशा दोन भागांतच असल्यामुळे मंदिर वाकाटककालीन होते, अशा तर्काला पुष्टी देणारेच होते.

* भुमरा येथील शिवमंदिर परिसरात सापडलेले पुरावशेष
कोसल आणि मालव जनषदांतील कलेचा विचार करतांना द्वितीय पृथ्वीषेणाच्या काळातील पार्वतीचे म्हणून प्रसिद्ध असलेल्या, पाषाणी चिऱ्यात बांधलेल्या शिवमंदिराचा आपण विचार केला होता. तलविन्यासाच्या (प्लान) दृष्टीने हे मंदिर नागला येथील मंदिराच्या आकाराने लहान असले तरी तेथील शिवालयासारखेच आहे असे म्हणावयास हरकत नाही. समोरच्या सोपानमार्गाच्या बाजूंना असलेली दोन लहान मंदिरे ही नागरा येथील देवळात जास्त आहेत, पार्वती मंदिराच्या समोरचा भाग उघड्या मंडपाचा आहे, त्याला असलेल्या वामन भिंती (ड्वॉर्फ वॉल्स) अजूनही शिल्लक असून त्यावर गुहांमधून वास करणाऱ्या सिंहादी वन्य प्राण्याच्या आकृती दाखवितो पार्वती मंदिराप्रमाणेच कोरलेल्या आहेत. अलेक्झांडर कनिगहॅमने वर्णन केलेल्या, प्रदक्षिणा पथाच्या छतासाठी वापरलेल्या शिळा आज नाहीशा झाल्या असल्या तरी, प्रवासवर्णनावरून गाभा-याभोवती छत असलेला प्रदक्षिणापथ होता, हे स्पष्ट आहे. पुढील मंडपाच्या कठड्याच्या अनुसंधानाने प्रदक्षिणापथाचा कठडा आजही नचना येथील पार्वती मंदिरात अस्तित्वात आहे. तेथील गाभाऱ्यावर आणखी एक मजला होता, हेही कनिगहॅमच्या रिपोर्टमध्ये समाविष्ट केलेल्या छायाचित्रावरून स्पष्ट होते.
नचना येथील पार्वती मंदिर म्हणून प्रसिद्ध असलेले शिवालय उच्चकल्पवंशीय राजा व्याघ्र महाराज याच्या काळात म्हणजे इ. स. ४७० ते ४९० च्या दरम्यान बांधले गेले असावे उच्चकल्यवंशीय राजांच्या सीमेला लागूनच असलेल्या परिव्राजक महाराज यांच्या राज्यात आणखी एक शिवालय इ. स. च्या सहाव्या शतकाच्या सुरुवातीस हल्लीच्या 'भुमरा' (संस्थान नागोद) येथे बांधले गेले. हे शिवालय जवळजवळ पार्वती मंदिराच्या विन्यासनुरूप बांधले आहे. फक्त यात नागरा येथील शिवालयाप्रमाणेच सोपान मार्गाच्या दोहो बाजूस एकेक लहान मंदिर किंवा देव कुलिका आहे. येथील वेदीबंधही जाड्यकुंभ व घट आणि छाद्य अशा स्तरात आहे, म्हणजे ते नागरा येथील देवळाच्या जोत्याच्या वेदीबंधाशी जवळीक मोकळ्या अंगणानंतर, छत असलेला म्हणजे सांधार प्रदक्षिणापथ येथे होता. सुदैवाने प्रदक्षिणापथावरील गवाक्षात असलेली लोकपालांची आणि स्कन्द, कार्तिकेय, ब्रह्मा, गणेश यांची शिल्पे सुट्ट्या स्वरूपात का होईना, पण आजही उपलब्ध आहेत. लोकपाल/दिक्पाल यांच्या शिल्पावरून सहज लक्षात येते, की भुमरा येथील शिवालयाची रचना 'प्रासाद' या स्वरूपात करण्यात आलेली असावी, हे निश्चित। यापूर्वीच्या लेखात नमूद केल्याप्रमाणे नचना येथील पार्वती मंदिरसुद्धा 'प्रासाद' म्हणून रचले असले तरी त्यावर चार दिशांना लोकपालांची अथवा दिक्पालांची शिल्पे योजिली नव्हती. गुहा आणि वन्यप्राण्यांमुळे, या मंदिरात शिवाचा निवास असलेल्या कैलास पर्वताचा आभास निर्माण करण्यात आलेला होता. परंतु भुमरा येथील ठळकपणे लक्षात येणारे दुसरे साम्य म्हणजे नागरा येथील शिवालयाप्रमाणेच याही ठिकाणी भूत प्रणालाची अभिषेकजल वाहून नेण्यासाठी योजना केली आहे. वरील विवेचनावरून सहज लक्षात येईल की आकाराने लहान असून दगडात बांधले असले तरी भुमरा येथील शिवालय हे नागरा येथील शिवालयाची एक प्रतिकृती व सुधारून वाढवलेली आवृत्तीच होती.
response.lokprabha@expressindia.com
विन्ध्यशक्तिसुतश्चापि प्रवीरो नाम विर्यवान् ।
भोक्ष्यते च समाः षष्टिं पुरीं काञ्चनकां च वै।
यक्ष्यते वाजपेयैश्च समाप्तवरदक्षिणैः। तस्य पुत्रास्तु चत्वारो भविष्यन्ति नराधिपाः ॥
पुरणात केलेल्या या उभविष्यवाणीप्रमाणे विन्ध्यशक्तीचा पराक्रमी पुत्र प्रवीर म्हणजे वाकाटक घराण्यातील प्रवरसेन (प्रथम) हा साठ वर्षे उदिका आणि चनकाम येथे राज्य करील. भरघोस दक्षिणा देऊन हा वाजपेय यज्ञ करेल. त्याचे चार पुत्र आपली स्वतंत्र राज्ये स्थापन करतील. वाकाटकांच्या दोन्ही शाखांच्या ताम्रपटांतून या प्रवरसेनचा उल्लेख असून त्याने अनेक प्रकारचे श्रौतयाग केले होते. त्याला सम्राट ही पदवी होती असाही दुजोरा मिळतो. त्याची सम्राट ही पदवी वाजपेय याग केल्यामुळे त्याला प्राप्त झाली असली तरी आपल्या पराक्रमाच्या बळावर त्याने मोठे साम्राज्यही प्रस्थापित केले होते असा विद्वानांचा कयास आहे. यासाठी थोडीशी पार्श्वभूमीही लक्षात घेतली पाहिजे. शुंगांच्या अस्तानंतर सातवाहनांनी स्वसामर्थ्याने दक्षिणेत एवढे मोठे साम्राज्य स्थापित केले की त्यात दक्षिणेतील तिन्ही समुद्रांचा समावेश असावा असे म्हणण्यास जागा आहे. गौतमीपुत्र सातकर्णीच्या (इसवीसन दुसऱ्या शतकाचा पूर्वार्ध) काळात तर त्याच्या साम्राज्यात मध्य प्रदेशापासून आंध्र प्रदेशापर्यंत व पश्चिम महाराष्ट्र व कोकणची किनारपट्टी यांचा अंतर्भाव होत होता. यज्ञ सातकर्णीच्या शिदाचे जहाज असलेल्या नाण्यावरून तर सागरी व्यापारावर त्यांची पकड होती हे स्पष्ट होते. अमरावती येथील उभ्या बुद्धमूर्तीची नक्कल करणाऱ्या प्रतिमा आग्नेय आशियातील देशांमध्ये आणि श्रीलंकेमध्ये सापडतात यावरून त्यांचा सांस्कृतिक प्रवाह दिसून येतो. परंतु इसवीसनाच्या तिसऱ्या शतकात सुरुवातीस या साम्राज्याला अवकळा प्राप्त झाली आणि अनेक शक, क्षत्रप इत्यादींची लहान लहान राज्ये त्याऐवजी दक्षिणेत आढळू लागली. त्यामुळे यातील बऱ्याचशा राज्यांवर प्रवरसेन (प्रथम) याने ताबा मिळवला असावा, असे म. म. मिराशी मानतात आणि भविष्यवाणी केल्याप्रमाणे नगरधन आणि वाशीम येथील शाखांच्या बरोबरच त्याच्या दुसऱ्या दोन पुत्रांनीही राज्ये स्थापन केली असावीत असा तर्क म. म. मिराशी मांडतात. त्यांच्या मते कोसल म्हणजे हल्लीच्या झारखंड राज्यात तिसऱ्या पुत्राने राज्य स्थापन केले असावे आणि चौथ्या पुत्राने दक्षिण महाराष्ट्र आणि उत्तर कर्नाटकात म्हणजे प्राचीन कुंतल देशात राज्य स्थापन केले असावे.
▲ मध्यप्रदेशातील जबलपूर येथील सिंधुराशी पर्वताच्या पूर्वेला असलेला केवलनृसिंह
नंदिवर्धन (नगरधन) आणि वत्सगुल्म (वाशीम) येथील दोन शाखांतील नऊ पिढ्यांनी मिळून विदर्भ आणि आसपासच्या मुलखावर आपली सत्ता प्रस्थापित केली, हे त्या शाखांतील राजांच्या ताम्रपट आणि शिलालेखांवरून सहज लक्षात येते. तशा प्रकारच्या इतिहासाचा स्रोत या अनुमानित दोन शाखांबद्दल नसल्याने त्यांचा राज्यविस्तार किती होता हे नेमकेपणाने सांगता येत नाही. मात्र म. म. मिराशींनी आपल्या कासोशीच्या संशोधनाच्या आधारे त्यांचा शोध घेतला असे दिसते.
वत्सगुल्म शाखेचा दुसरा राजा प्रवरसेनचा नातू आणि सर्वसेनाचा मुलगा विन्ध्यशक्ती याचा ताम्रपट मिळालेला असून त्यावरून नांदीकट विषय म्हणजे महाराष्ट्रातील नांदेड जवळचा भाग त्याच्या ताब्यात होता हे स्पष्ट होते. त्याच्या दुसऱ्या एका ताम्रपटावरून हैदराबाद संस्थांमधील हिन्यांच्या खाणीच्या प्रदेशातही त्याचा अंमल होत हे दिसते. त्याच्याविषयीचा आणखी एक सूचक उल्लेख वराहदेवाच्या अजिंठा येथील लेणे क्रमांक सोळा या लेण्यातील राज्यप्रशस्तीमध्ये आहे. या शिलालेखातील सातव्या ओळीमध्ये सर्वसेनाचा मुलगा श्रीविन्ध्यशक्ती म्हणजेच द्वितीय विन्ध्यशक्ती याने कुंतल देशाच्या राजावर विजय मिळवला, असा उल्लेख येतो. म. म. मिराशी याचा असा अर्थ लावतात की प्रवरसेनच्या चौथ्या पुत्राचे जे कुंतल देशात राज्य असावे, ते गिळंकृत करून मानपूर येथून राज्य करणारा राष्ट्रकूट राजा अविधेय याने विदर्भआणि अश्मक या प्रदेशांवर राज्य प्रस्थापित केले असावे. हे सहन न होऊन विन्ध्यशक्तीने अश्मक हा प्रदेश तर मिळवलाच, परंतु कुंतलेन्द्र म्हणजे राष्ट्रकूट राजा अभिधेय याचा युद्धात पराभव केला असावा.
कुंतल देशाशी यानंतरही वाकाटकांचे संबंध प्रस्थापित झाल्याचे दिसते. वाकाटकांच्या नदीवर्षण शाखेतील पाचव्या पिढीतील सुप्रसिद्ध राजा प्रवस्सेन (द्वितीय) याचा पुत्र नरेन्द्रसेन याची महाराणी अजित भट्टारिका ही कुंतल देशाची राजकन्या होती, हे द्वितीय पृथ्वीषेण याच्या बालाघाट ताम्रपटातील उल्लेखावरून स्पष्ट होते. वेम्बारकवासक म्हणजे चांद्यापासून २८ मैलांवर असलेल्या वैनगंगेच्या काठावरील बेम्बळ या ठिकाणावरून दिलेल्या ताम्रपटात कुन्तालाधिपतीची कन्या महादेवी अजितभट्टारिका आणि महाराज श्री नरेंद्रसेन यांचा आपण पुत्र आहोत हे तो अभिमानाने नोंदवतो.
म. म. मिराशी यांच्या मते द्वितीय विन्ध्यशक्तीच्या काळात म्हणजे चौथ्या शतकाच्या शेवटी जरी राष्ट्रकुट कुंतलेन्द्र आणि वाकाटक यांच्या घराण्यात वितुष्ट उत्पन्न झाले असले तरी या दोन घराण्यांत गुप्त सम्राटांमुळे समेट घडून आला असावा. आपल्याला हे माहीतच आहे की, नरेद्रसेनचा पिता प्रवस्सेन द्वितीय याची आई प्रभावतीगुप्ता ही गुप्त सम्राट द्वितीय चंद्रगुप्ताची मुलगी होती. ही अत्यंत भगवद्भक्त म्हणजे विष्णूची
श्री गोदो नृसिंहा
उपासिका असून तिच्याशी झालेल्या विवाहानंतरच तिचा पती महाराज रुद्रसेन हाही परमभागवत झाला होता. वाकाटकांच्या ताम्रपटात 'आपल्याला भगवान चक्रपाणीच्या म्हणजे श्रीविष्णूच्या प्रसादामुळे राज्यलक्ष्मीचा लाभ झाला' असा आवर्जून उल्लेख येतो. म. म. मिराशीच्या मते कुंतल देशाचे राजे आणि गुप्त सम्राट यांचे नुसते सलोख्याचेच नव्हे तर मित्रत्वाचे संबंध होते असे 'कुंतलेश्वरदौत्य' या संस्कृतमधील काव्यग्रंथावरून दिसून येते. या लघुकाव्याच्या शीर्षकावरून अनुमान करता येते त्याप्रमाणे गुप्त सम्राटांच्या दरबारातून त्यांचा दूत कुन्तलेश्वराच्या दरबारात गेला होता. तो कदाचित स्वतः त्या काव्याचा कर्ता महाकवी कालिदासच असावा. हे संपूर्ण काव्य जरी उपलब्ध नसले तरी एका श्लोकातील स्पष्ट उल्लेखामुळे कालिदासाने द्वितीय चंद्रगुप्ताला सादर केलेल्या अहवालाप्रमाणे कुंकुतलेश्वर गुप्त सम्राटावर राज्याचा सर्व भार विश्वासाने टाकून मोठ्या ऐषारामाचे आयुष्य घालवतो. यातील दुसऱ्या एका श्लोकाप्रमाणे सुरुवातीला कुतल राजाच्या दरबारात दूताकडे म्हणजे कालिदासाकडे थोडेसे दुर्लक्ष झालेले होते. त्याला त्याच्या योग्यतेप्रमाणे म्हणजे सम्राटाच्या दूताला शोभेलसे आसन देण्याची तत्परता कुन्तलाच्या दरबाराने दाखवली नाही, परंतु नंतर राजाशी झालेल्या संवादानंतर गुप्त सम्राटांवर भर टाकल्याने कुंतलेश्वर मोठ्या आनंदाने राज्य करत होता असे दिसते.
कालिदासाच्या 'कुंतलेश्वरदौत्य' या काव्यातील पुढील उद्धृत केलेला श्लोक या दृष्टीने मोठा सूचक आहे. असकलहसितत्वात्क्षालितानीव कान्त्या। मुकुलितनयनत्वद्व्यक्तकर्णोत्पलानि । पिबति मधुसुगन्धीन्याननानि प्रियाणां । त्वयि विनिहितभारु कुन्तलानामधीशः ॥
▲ नांदेड शहरातील गोदा लक्ष्मी नृसिंह मंदिरातील केवल नृसिंहाची प्रतिमा
याचा सारांश असा आहे की, कुन्तलांचा अधिपती म्हणजे गुप्त सम्राटावर निर्धास्तपणे अवलंबून असल्याने कुन्तलचा अधिपती आपल्या प्रिय पत्नींसमवेत मदिरेचा आस्वाद मोठ्या आनंदाने घेतो.
अजिंठा येथील १६ क्रमांकाच्या लेणीतील शिलालेखामध्ये द्वितीय विन्ध्यशक्तीने विजय मिळवल्याचा उल्लेख आहे. व तो साताऱ्यातील हल्लीच्या माण येथून म्हणजे प्राचीन मानपूर येथून कृष्णा नदीच्या तीरावर राज्य करणाऱ्या अविधेय नावाच्या राष्ट्रकूट नावाच्या राजाला उद्देशून आहे, असे म. म. मिराशीचे मत झाले आहे. परंतु कुन्तल देश म्हणजे प्राचीन राजधानी वैजयंती (हल्लीचे बनवासी) आणि नंतर पलाशिका (धारवाड जिल्ह्यातील हालसी) इथून राज्य करणारे कदंब होत, असे सुप्रसिद्ध इतिहासतज्ज्ञ नीलकंठशास्त्री यांचे मत आहे. कदाचित पृथ्वीषेणाची आई अजितभट्टारिका ही कदंब कुळातील असावी असे अनेक विद्वानांचे मत झाले आहे. वाकाटकांच्या शिलालेखात कुन्तलदेशाचा आणखी एकदा उल्लेख येतो आणि तो म्हणजे वराह देवाच्यावर उल्लेख केलेल्या अजिंठा येतील १६ क्रमांकाच्या लेण्यातील शिलालेखात आहे. या लेखातील राजप्रशस्तीमध्ये विन्ध्यसेनानंतर प्रवरसेन (म्हणजे वाशीम शाखेतील द्वितीय प्रवरसेन) त्याचा अगदी कोवळ्या वयात म्हणजे आठव्या वर्षी राज्यावर आलेला मुलगा (याचे नाव लेख पुसट झाल्याने नष्ट झाले आहे) त्याचा पुत्र देवसेन व त्यानंतर हरिषेण अशी वंशावळ दिलेली आहे.
वराहदेव आपल्या सम्राटाचे सिंहाप्रमाणे प्रतापी असल्याचे वर्णन करतो आणि अठराव्या श्लोकात कुन्तल, अवंति, कोसल, त्रिकूट, लाट, आणि आंध्र हे शौर्यासाठी प्रसिद्ध असलेल्या राजांचा तो अधिराज असावा असे सुचवले आहे. या श्लोकातील काही श्लोक, विशेषणात्मक शब्द नष्ट झाले असले तरी हरिषेणाचे या सर्व प्रदेशावर सार्वभौमत्व असावे याबाबत सर्व विद्वानांचे एकमत आहे.
हरिषेणाने राज्यावर आल्या आल्या खानदेशातील स्थालकनगर (थाळनेर) येथून काही दाने दिली होती. विद्वानांच्या मते खानदेशच नव्हे तर नर्मदेपासून तुंगभद्रेपर्यंत आणि बंगालच्या उपसागरापासून ते अरबी समुद्रापर्यंत असे विस्तृत त्याचे साम्राज्य असावे. यातील त्रिकूट म्हणजे सह्याद्रीच्या दोन्ही उतारांवर राज्य करणारे त्रैकुटक, कोसल म्हणजे हल्लीच्या झारखंडमधील रायपूरच्या सभोवतालच्या प्रदेशावर राज्य करणारे राजे आणि आंध्र म्हणजे वेगीहून राज्य करणारे विष्णुकुंडिन यात शंका नाही. त्यांच्याशी वाकाटक राजांचे सांस्कृतिक संबंध कसे होते याविषयीच्या पुराव्यांचा आपण नंतरच्या लेखात विचार करणार आहोत. पण कुन्तल म्हणजे धारवाड, बेळगाव व दक्षिण महाराष्ट्र या प्रदेशावर राज्य करणारे कदंब राजे असावेत असा विद्वानांचा कयास आहे.
काही वर्षांपूर्वी धारवाड विश्वविद्यालयात वाकाटक राजवंश व त्यांची कला या विषयावर व्याख्यान देण्यासाठी गेलो असता प्राचीन इतिहास व पुरातत्त्व विषयाच्या संग्रहालयाला भेट दिली. त्यात रामटेक येथील बैठ्या दोन हाती केवळ नरसिंहाची प्रतिमा मला आढळली. मूर्ती विज्ञानदृष्ट्या तिचे वाकाटक मूर्तीशी साम्य तर होतेच, पण धाटणीवरून ती चालुक्यपूर्व काळातील असावी असे माझ्या लक्षात आले.
त्यानंतर एका वर्षी मी व डॉ. वैशाली वेलणकर यांनी बेळगाव, धारवाड भागामध्ये एका आठवड्याचा दौरा हाती घेतला. याचे दुसरे कारण असे होते की, काही स्थानिक इतिहासतज्ज्ञांनी अशा ध्यानाच्या अनेक मूर्ती या भागात आढळतात, एवढेच नाही तर नरसिंहाची उपासना करणारी काही घराणी व तशा प्रकारची मंदिरे असल्याचे सांगितले होते. त्यामुळे सर्वप्रथम बनवासी येथील मधुकेश्वर मंदिराला आम्ही भेट दिली. आणि त्या ठिकाणी आम्हाला रामटेकच्या मूर्तीच्या मानाने लहान ठेवणीची परंतु हातामध्ये चक्र असलेली तशीच मूर्ती मिळाली.
जाणकारांनी सांगितलेली माहिती नक्कीच विश्वसनीय होती हे आम्ही नंतर सात दिवस केलेल्या दौऱ्यात प्रचीतीस आले. नरसिंह संप्रदायाच्या एका घरातील लोकांशी बोलताना त्यांनी आपल्या घराण्यातील परंपरा पुढीलप्रमाणे सांगितली. आमचे मूळ घराणे गोदावरीच्या काठचे असून तिथूनच आम्ही ही नरसिंह उपासनेची परंपरा आणली असे आमचे वाडवडील सांगतात. त्या संदर्भात माझे असेही लक्षात आले की नांदेड येथे देवालयांचे संशोधन करताना एका यादव काळातील केवलनरसिंहाची मूर्ती आम्हाला आढळून आली. ती वाकाटक काळातील परिचित मूर्तीप्रमाणे एक गुडघा वर करून समोरच्या गुडघ्यावर हात विसावल्याप्रमाणे न दाखवता उकिडवी असून अंगाभोवती योगपट्ट गुंडाळलेली होती. परंतु मराठवाडा आणि या भागात नरसिंह उपासनेची परंपरा समान आहे हे दिसून येते.
▲ कर्नाटकातील दक्षिण कानडा जिल्ह्यातील कुंदापूर तालुक्यातील गंगानाडू येथील केवलनृसिंहाची प्रतिमा
▲ कर्नाटकातील शिमोगा जिल्ह्यातील कुप्पत्तुर येथील नृसिंह मंदिरातील नृसिंहाची प्रतिमा
वर पाहिल्याप्रमाणे पांडुरंगपल्ली ताम्रपटात उल्लेखलेले राष्ट्रकूट हे कुन्तलाधिपती की वनवासीहून राज्य करणारे कदंब हे वाकाटकांच्या शिलालेखांत व ताम्रपटांत उल्लेखलेले कुन्तलेन्द्र किंवा कुन्तलाधिपती याविषयी मतमतांतरे आहेत.
आज या सर्व पुराव्यांचा आढावा घेतला तर असे म्हणावयास हरकत नाही की शासित प्रदेशामध्ये इसवीसनाच्या पाचव्या शतकात लोकप्रिय झालेल्या नरसिंह मूर्तीची संख्या पाहता कदंब हेच पृथ्विषेणाच्या ताम्रपटात अपेक्षित असलेले कुन्तलाधिपती असावेत. रामटेक येथे नरसिंहाची दोन मंदिरे आहेत, एक केवलनरसिंहाचे तर दुसरे रुद्रनरसिंहाचे. केवलनरसिंह मंदिरात सापडलेल्या शिलालेखात प्रवरसेन द्वितीय याची आई प्रभावतीगुप्ता हिच्या स्मरणार्थ तिच्या मुलीने हे मंदिर प्रवरसेनाच्या साहाय्याने बांधले
▲ चंद्रपूर येथील गोगोबाग्राम येथील केवलनृसिंहाची प्रतिमा, आता ती नवीन मंदिरात ठेवण्यात आली आहे. (छायाचित्र सौजन्य- डॉ. अरविंद जामखेडकर)
असावे. तिचा पणतू पृथ्विषेण द्वितीय आणि प्रवस्सेन द्वितीय यांचे ताम्रपट मांधळच्या उत्खननात सापडले आहेत. उत्खननात बलराम आणि कृष्ण यांच्या मूर्तीदेखील सापडल्या आहेत. एवढेच नव्हे तर प्रभावतीगुप्ता हिचा पतीश्री रुद्रसेन महाराज याचाही ताम्रपट सापडला आहे.
▲ कर्नाटकातील धारवाड जिल्ह्यातील हलसी येथील वराह नृसिंह मंदिरातील दक्षिणेकडील भिंतीवर असलेला मुदा नृसिंह.
भीष्म यांनी युधिष्ठीरासह पाचही पांडवांनी 'जितं भगवता पुरुषेण' असा गजर करत आनंदाने उड्या मारल्या अशा प्रकारचा उल्लेख आला आहे. यावरून सहज लक्षात येते की महाराज रुद्रसेन याची महाराणी प्रभावतीगुप्ता, द्वितीय पृथ्विषेण आणि कदंब कुळातील काही राजे यांना प्रभावतीगुप्ता हिच्या ताम्रपटाची सुरुवात तिचा पिता परम भागवत चंद्रगुप्त द्वितीय याच्या लेखात दिसते त्याप्रमाणे 'जितं भगवता पुरुषेण' या मंगलाचरणाने झालेली आहे. तशाच प्रकारची ताम्रपटांची सुरुवात कदंब घराण्यातील ताम्रपटातदेखील दिसून येते. हे मंगलवचन विष्णूला ज्याचा उल्लेख एरवी पूजेच्या संकल्पात महापुरुष म्हणून येतो याविषयी विद्वानांमध्ये संदेह नाही. पण हे नमन पांचरात्र धर्माशी संबंधित एका आख्यानाचा भाग आहे याची कल्पना मात्र नव्हती. शांतिपर्वाच्या नारायणीय उपाख्यानामध्ये भगवान वासुदेवाचा महिमा वर्णन केल्यानंतर नारद आणि जोडणारा एक महत्त्वाचा दुवा म्हणजे सात्वत अथवा पंचरात्र धर्म. त्याचबरोबर हेही लक्षात ठेवले पाहिजे की वाशिम शाखेच्या एका ताम्रपटात सात्वत धर्मीयांसाठी दोन मठ बांधून दिल्याचा उल्लेख आहे. अशा रीतीने वाकाटकांची नंदीवर्धन आणि वत्सगुल्म येथील भागवत धर्माचे हे लोण कदंब कुलात पर्यायाने उत्तर कर्नाटकात पोचले असावे.
▲ बसूर केवल नृसिंहाची प्रतिमा. आता ती कर्नाटकातील धारवाड विद्यापीठ संग्रहालयात ठेवण्यात आली आहे.कुन्तलाधिपती हे मानपूर येथून राज्य करत होते की वैजयन्तीहून या विवादात न पडता दक्षिण महाराष्ट्र त्यातल्या त्यात सातारा जिल्ह्यातील माण परिसरातील शिलालेखातून सात्वत धर्माच्या अस्तित्वाचे धागेदोरे अथवा केवलनरसिंहाच्या मूर्तीच्या रूपाने ठोस पुरावा मिळेल आणि तेसुद्धा वाकाटक लेखांत अभिप्रेत असलेले कुन्तलाधिपती असतील अशी आशा करूया.
response.lokprabha@expressindia.com
प्रकार : गिरीदुर्ग जिल्हा : नागपुर उंची : १२०० फुट ...