Wednesday, March 8, 2023

मराठवाड्यातील उपेक्षीत प्राचीन मंदिरे

 

 



दै. लोकमत 10 जानेवारी 2021 (वर्धापन दिन पुरवणी)

मराठवाड्यातील पर्यटनाचा शिल्पांचा प्राचीन वारश्याचा विषय समोर आला की अजिंठा वेरूळ बिबी का मकबरा इथपर्यंत  विचार होतो आणि विषय संपून जातो. धार्मिक पर्यटनाच्या नावाखाली घृष्णेश्वर, औंढा नागनाथ, परळी वैजनाथ ही नावं उच्चारली की मुद्दा संपून जातो. या शिवाय मराठवाड्यात चालूक्यांच्या यादवांच्या काळातील अप्रतिम अशी मंदिरे आहेत, त्यावरील शिल्पाविष्कार चकित करणारा आहे हे लक्षातच घेतले जात नाही.

पर्यटन, अभ्यास, स्थानिक सहलींसाठी स्थळे असा विचार केल्यास मराठवाड्यातील काही प्राचीन मंदिरांचा विचार अग्रक्रमाने झाला पाहिजे. (या ठिकाणी विषयाच्या जागेच्या मर्यादेमुळे केवळ मंदिरांचा विचार केला आहे. लेण्या, किल्ले, दर्गे, कबरी, मकबरे यांचा समावेश यात विस्तारभयास्तव नाही. हे विषय स्वतंत्रपणे मांडल्या गेले पाहिजेत.)

औरंगाबाद : औरंगाबाद जिल्ह्यातील अंभई वडगांव, रहिमाबाद व पिशोर  (सर्वांचा ता.सिल्लोड) येथील मंदिरे प्राचीन आहेत. तिन्ही ठिकाणी स्थानिक लोकांनी मंदिराचा जिर्णाद्धार केला आहे. शिवुर बंगला (ता. वैजापूर) येथे रावणेश्वराचे मंदिर आहे.  परिसराचा विकासही केला आहे. पण याची माहिती बाहेरच्या पर्यटकांना अभ्यासकांना होत नाही. औरंगाबाद शहरात सातारा परिसरांत खंडोबा मंदिर आहे. पण त्याची ख्याती धार्मिक स्थळ इतकीच आहे. मराठेशाहीतील वास्तुशिल्पाचा हा एक उत्तम नमुना आहेे हे लक्षातच घेतले जात नाही. वेरूळला घृष्णेश्वर मंदिराच्या अगदी जवळ मुख्य रस्त्याला लागूनच अहिल्याबाईंनी बांधलेली अप्रतिम अशी बारव आहे. या बारवेत 8 छोटी मंदिरं आहेत. या ठिकाणी पर्यटक भेट देत नाहीत.

पैठणला सातवाहन कालीन स्तंभ हे तर महाराष्ट्राच्या इतिहासातील एक मानाचे पान आहे. त्या परिसरांचा विकास पुरातत्त्व खात्याकडून करण्यात आला आहे. पण तिथपर्यंत पर्यटक पोचत नाहीत.

औरंगाबाद जिल्ह्यातील या मंदिरांसोबतच पैठणच्या गोदावरी काठचे घाट मोठे सुंदर आहे. या घाटांवर विविध उत्सव प्रसंगी दिव्यांची आरास करून पर्यटकांना इथे आकर्षित करून घेता येवू शकते.

जालना : भोकरदन तालुक्यातील अन्वा येथील महादेव मंदिर 12 व्या शतकातील अतिशय उत्कृष्ठ असा स्थापत्य अविष्कार आहे. या मंदिरावरील विष्णुच्या शक्तिरूपातील मुर्ती भारतभरच्या अभ्यासकांचे आकर्षण ठरलेल्या आहेत. अतिशय भव्य आणि उंच पीठावर हे मंदिर स्थापित आहे. पुरातत्त्व खात्याने मंदिराचा जिर्णाद्धार चांगल्या पद्धतीने केला आहे. पण तिथपर्यंत जाताना कुठलाही माहिती फलक उभारलेला नाही. मंदिराच्या भोवताली बकाल वस्ती आहे. ग्रामस्वच्छता अभियानात या परिसराची स्वच्छता का झाली नाही हे कळत नाही.

अंबड तालुक्यात जामखेड येथील खडकेश्वर मंदिर हे अतिशय एक महत्त्वाचे प्राचीन मंदिर. गावकर्‍यांनी चांगल्या पद्धतीने याचा जिर्णाद्धार केला आहे. अंबड शहरातील मत्सोदरी मंदिर सर्वपरिचित आहे. पण याच शहरांत अहिल्याबाईंच्या काळातील सुंदर पुष्करणी बारव आहे. त्यात एक शिवमंदिरही आहे. या परिसराचा नगर पालिकेच्या वतीने विकासही करण्यात आला आहे. पण तिथपर्यंत पोचणारा रस्ता, बाहेरच्या परिसरांतील आक्रमणे, नाला यांनी हे ठिकाण दूर्लक्षित राहिले आहे. अंबड शहरांतच खंडोबाचे मंदिर आहे. या मंदिराचे बांधकाम आजही संपूर्ण शाबूत उत्तम अवस्थेत आहे.

अंबड तालुक्यातच चिंचखेड येथील खंडोबा मंदिरही प्राचीन काळातील आहे. या परिसराची स्वच्छता आणि डागडुजी गावकर्‍यांनी उत्तम केली आहे. मंठा तालुक्यात हेलस येथे प्राचीन मंदिर आहे.

बीड : शहरांतील कंकालेश्वर मंदिर सर्वपरिचित आहे. या मंदिराचा जिर्णोद्धार संस्थानने केला. पण मंदिराचा परिसर अतिशय बकाल आहे. ज्या कुंडात मंदिर आहे त्या जलाशयाच्या पाण्याच्या निचरा होण्याचे मार्ग बंद झाल्याने साठलेल्या पाण्याची दुर्गंधी येते. परिसराचे सुशोभन होण्याची नितांत गरज आहे. माजलगांव नजीक केसापुरी येथे केशवराज मंदिर आहे. आताचे जे मंदिर गावात आहे त्याचे बांधकाम दोनशे वर्षांपूर्वीचे आहे. पण मुळ मंदिर गावाबाहेर चार किमी अंतरावर भग्नावस्थेत आहे. त्याचा जिर्णाद्धार होण्याची गरज आहे. हा परिसर तळ्याकाठी असून जवळच मराठा कालखंडातील हनुमान मंदिर आहे. त्याला भव्य असा दगडी ओटा आहे.  

अंबाजोगाई परिसर तर असंख्य शिल्पे आणि प्राचीन मंदिर अवशेषांनी भरलेला आहे. बाराखंबी भागात उत्खननाने काम चालू आहे. ते अपूर्ण अवस्थेत पडून आहे. जवळच धर्मापुरी येथे केदारेश्वर मंदिर आहे. तेथे जिर्णाद्धाराचे काम पुरातत्त्व खात्याने पूर्णत्वास आणले आहे. याच गावात भुईकोट किल्ला आहे. मादळमोही गावात तर बारवेत आख्खे मंदिरच आहे. या परिसराचा विकास गावकर्‍यांनी आस्थेने केला आहे.

उस्मानाबाद : भूम तालुक्यातील प्राचीन माणकेश्वर मंदिर महाराष्ट्रातील मोजक्या अप्रतिम मंदिरांपैकी एक आहे. या मंदिरांवरी शिल्पे अभ्यासकांना कायम आकर्षित करत आलेली आहेत. सात द्वारशाखा असलेले महाराष्ट्रातील हे एकमेव मंदिर. चालुक्यांच्या काळातील अतिशय उत्कृष्ठ अशा कोरीव कामांनी येथील स्तंभ सजलेले आहेत.
उमरगा येथील शिव मंदिर अतिशय चांगल्या स्वरूपात आहे. स्थानिकांची मंदिराचा जिर्णाद्धार केलेला असून परिसरही उत्कृष्ठ राखला आहे.

लातुर : निलंगा येथील शिवमंदिर आणि पानगांव येथील विठ्ठल मंदिर ही दोन मंदिरे लातुर जिल्ह्यातील प्राचीन मंदिरांपैकी सगळ्यात सुस्थितीत असलेली मंदिरे आहेत. निलंगा मंदिरातील हरगौरीचे शिल्प अप्रतिम आहे. मंदिरावरील भैरव शिल्पे किंवा केवल शिवाची शिल्पे विशेष आहेत.

पानगावच्या विठ्ठल मंदिराकडे खुपसे दुर्लक्ष पर्यटकांकडून झाले आहे. या मंदिर परिसराचा विकास, तिथपर्यंत पोचण्याचा रस्ता याचा विचार झाला पाहिजे. हे मराठवाड्यातील प्राचीन काळातील महत्त्वाचे मंदिर आहे.

नांदेड : होट्टल (जि. देगलुर) हे आख्खे गावच शिल्पांनी समृद्ध असे गांव आहे. मंदिरांचे गाव म्हणूनच या परिसराची ओळख आहे. दोन मंदिरांचा जिर्णाद्धार झालेला आहे. आता उर्वरीत मातीत गाडल्या गेलेल्या मंदिराचा जिर्णोद्धार होणे गरजेचे आहे. होट्टलच्या मंदिरावरील नृत्य गणेशाची मृर्ती आणि येथील सुरसुंदरींच्या मृर्ती विशेष आहेत.

राहेरचे नृसिंह मंदिर आणि मुखेडचे मंदिर ही मंदिरे प्राचीन आहेत. राहेर गोदावरी काठी असल्याने हा परिसर रम्य आहे. राहेरला गोदावरीचे नाभीस्थान आहे असा उल्लेख दासगणु महाराजांच्या काव्यात आहे.
नांदेड शहरातील गोदावरीवरील घाट पण पर्यटकांसाठी आकर्षणाचा विषय होवू शकतात. या परिसराचे सुशोभन झाले पाहिजे.

हिंगोली : औंढा नागनाथ मंदिर प्रसिद्ध आहे पण याच गावात अजून प्राचीन मंदिरे आहेत त्याची दखल फारशी घेतली जात नाही. जवळच राजापुर गावात सरस्वती, अर्धनारी नटेश्वर आणि योग नरसिंहाच्या अप्रतिम मुर्ती आहेत. येहेळेगांव तुकाराम या गावांत प्राचीन बारव आहे.

परभणी :  धारासुर (ता. गंगाखेड) येथील गुप्तेश्वर मंदिर महाराष्ट्रातील प्राचीन मंदिरांमध्ये त्याच्या शिखरासाठी प्रसिद्ध आहे. या मंदिरावरील विष्णुच्या विविध मुर्ती अप्रतिम अशा आहेत. गोदावरीच्या काठावर हे मंदिर असल्याने सर्व परिसर धार्मिक आणि इतर पर्यटनासाठी अतिशय योग्य असा आहे. या मंदिराचा अर्धा भाग ढासळला असून जिर्णोद्धाराचा प्रस्ताव पुरातत्त्व विभागाकडे पडून आहे. त्यावर तात्काल कार्यवाही झाली पाहिजे.

चारठाणा (ता. जिंतूर) येथील विविध मंदिरे, नृसिंह तीर्थवरील नदीचा घाट, पुष्करणी बारव या सगळ्याचा विचार करून संस्कृती ग्राम म्हणून या परिसराचा विकास झाला पाहिजे. आजही या परिसरांत प्राचीन शिल्पे सापडतात. याच परिसरांत अजून उत्खनन होण्याची गरज आहे.

गंगाखेड हे नदीकाठी वसलेले प्राचीन गाव. संत जनाबाईंची भूमी म्हणून प्रसिद्ध आहे. या गावात नदीकाठी सुंदर असे घाट आहेत. या घाटांच सौंदर्य वाढवून परिसर विकसित केला गेला पाहिजे.  

पैठण, गंगाखेड, नांदेड येथील नदीकाठ हा एक स्वतंत्र विषय पर्यटनासाठी विचारात घेतल्या गेला पाहिजे.
लेखात अतिश त्रोटकपद्धतीने काही मोजक्या मंदिरांचा विचार केला आहे. गावोगावची प्राचीन मंदिरे, गावोगावच्या बारवा, मठ, समाधीस्थळे यांचा जिर्णोद्धार झाला पाहिजे. ही कामे तीन पातळीवर होवू शकतात.

1. पुरातत्त्व खात्यातर्फे  त्यांच्या अखत्यारीतील पुरातत्त्वीय स्थळांचा विकास केला जावू शकतो. त्यासाठी पुरेसा निधी उपलब्ध होणे गरजेचे आहे.
2. सामाजिक कृतज्ञता निधी (सी.एस.आर.) या माध्यमांतून काही निधी इतर स्थळांसाठी वापरला जावू शकतो. मराठवाड्यातील औद्योगीक क्षेत्रात काम करणार्‍या संघटना व्यक्ती आस्थापना यांनी यात लक्ष घालून आपल्या निधीतील काही रक्कम या कामासाठी वळवली पाहिजे.
3. स्थानिक पातळीवर निधी उपलब्ध करूनही काही कामं होवू शकतात. हतनुर (ता.सेलू जि. परभणी) येथील ग्रामस्थांनी आपल्या परिसरांतील शेतमालाच्या विक्रीतून 1 कोटी इतकी विक्रमी रक्कम पाच वर्षांत गोळा केली. गावातील प्राचीन शिव मंदिर आणि बारव यांची दुरूस्ती केली. जवळच मंगल कार्यालय उभारले. हा एक आदर्श या परिसरांतील लोकांनी उचलला पाहिजे.

या लेखात केवळ मंदिरांचा विचार केला आहे. पण किल्ले, दर्गे, मकबरे, कबरी यांचा विचार केल्यास किमान 50 स्थळे अतिशय उत्कृष्ठ पद्धतीने पर्यटकांसाठी म्हणून सहज विकसित करता येवू शकतात. त्यातून पर्यटनाला मोठ्या प्रमाणात चालना मिळेल. याच परिसरांत प्राचीन वाडे आहेत. त्यांची डागडुजी करून पर्यटकांना राहण्याची पण वेगळी वैशिष्ट्यपूर्ण अशी व्यवस्था करता येवू शकते. उंडणगांव (ता.सिल्लोड जि. औरंगाबाद) अशी चाचपणी आम्ही केली आहे. परदेशी पर्यटक येथे राहून गेले आहेत. शाश्‍वत पर्यटनाचा विचार आपण सर्वांनी केला पाहिजे.  
मराठवाड्यात प्राचीन वारसा जतन व संवर्धनाची चळवळ आता सुरू झाली आहे. त्याला सगळ्यांनी मिळून गती देण्याची गरज आहे.
 
       श्रीकांत उमरीकर, जनशक्ती वाचक चळवळ, औरंगाबाद 9422878575

  दिवे लागले रे दिवे लागले । प्राचीन मंदिर उजळून निघाले ।।


  उरूस, 1 डिसेंबर 2020 

 त्रिपुरारी पौर्णिमेला मराठवाड्यात प्राचीन मंदिरांवर दिपोत्सव करण्याची संकल्पना देवगिरी सांस्कृतिक प्रतिष्ठानने काही गावांमध्ये मांडली. ऐतिहासिक वास्तू असलेल्या अगदी तालूकाही नसलेल्या गावांची निवडी यासाठी केली होती. चार गावांत प्रातिनिधीक स्वरूपात हा दिपोत्सव आनंदात आणि उत्साहात साजरा झाला. 

शेदूरवादा (ता. गंगापुर, जि. औरंगाबाद) या ठिकाणी खाम नदीच्या काठावर प्राचीन गणेश मंदिर आहे. तिथे नृत्य, गायन वादन असा सांस्कृतिक कार्यक्रम आयोजीत केला होता. खाम नदीच्या पात्रात दिवे सोडून कार्यक्रमाची सुरवात करण्यात आली. गिरीजा गोळे ही गुरू मुक्ता सोमण यांची विद्यार्थीनी. तिने भरतनाट्यम सादर केले. त्यानंतर सचिन नेवपुरकर आणि वर्षा जोशी यांनी विविध भक्तिगीते गाउन श्रोत्यांना चिंब भिजवले. कार्यक्रमाचे बहारदार सुत्रसंचालन प्रेषित रूद्रवार याने केले. 

औरंगाबादहून खास या कार्यक्रमासाठी आलेले रसिक गणेश मंदिर, छोटी बारव, नदीचा घाट आणि मध्वमुनीश्वर समाधी परिसर फिरून पाहताना ‘इतकी सुंदर जागा आपल्या शहराच्या अगदी जवळच आहे आणि आपल्या माहित नाही हे दुर्दैवी आहे’ अशी भावना व्यक्त करत होते. शेंदूरवाद्याच्या ग्रामस्थांना आपल्या छोट्या गावात असा एखादा सांस्कृतिक कार्यक्रम होवू शकतो आणि त्यासाठी रसिक 30 किमी दूर अंतरावरून गाड्या करून येवू शकतात याचेच अप्रूप वाटत होते. 

चाराठाणा हे औरंगाबाद नांदेड महामार्गावर जिंतूरच्या अलीकडे असलेले छोटे गाव. या गावाला अतिशय उज्वल अशी परंपरा आहे. ऐतिहासिकदृष्ट्या गावाला महत्व आहे. हेमाडपंथी मंदिरांनी गाव नटलेले आहे. भव्य अशी दगडी ओवर्‍यांची सुरेख बारव (पुष्करणी) गावात आहे. या गावी असलेल्या प्राचीन मानस्तंभ परिसराची स्वच्छता गावकर्‍यांनी मेहनतीने केली. स्त्रीयांनी सडा टाकून रांगोळ्या काढल्या. जमिनीवर मानस्तंभाची प्रतिकृती केली. त्याप्रमाणे दिव्यांची रचना केली. 

आपल्या गावच्या प्राचीन स्थळांबाबत अभिमान, स्थानिकांमध्ये जागृती ही सगळ्यात पहिल्यांदा आवश्यक आहे. त्याकडे अभ्यासकांचे लक्ष वेधणे, पर्यटकांना तिथपर्यंत आणणे ही कामे स्थानिक लोकांनी पुढाकार घेवून केली पाहिजेत.  चारठाणा या गावात गेली 3 वर्षे गावकरी पुढाकार घेवून इतिहास विषयक जागृती अभियान चालवत आहेत. विविध निमित्ताने उपक्रम हाती घेतले जात आहेत. जानेवारी महिन्यात सांस्कृतिक पदयात्रेचे  (हेरिटेज वॉक) आयोजन करण्यात आले होते. आताही पर्यटकांसाठी नियोजन केले जात आहे.

तिसरं ठिकाण होतं धारासुर. या ठिकाणी पूरातत्त्वीय दृष्ट्या अतिशय महत्त्वाचे असलेले गुप्तेश्वर मंदिर आहे. या मंदिराच्या जिर्णाद्धाराचे काम पुरातत्व खात्याकडून सुरू होत आहे. शिखर शिल्लक असलेले महाराष्ट्रातले हे सर्वात प्राचीन मंदिर आहे. या मंदिराची स्वच्छता दिवसभर गावकर्‍यांनी केली. रात्री मंदिरावर अक्षरश: दिवाळीच वाटावी अशी रोषणाई करण्यात आली होती. मंदिराच्या जोत्यावर समोर दिवे लावले होते. गावकर्‍यांनी यात उत्सुर्त सहभाग नोंदवला. याच मंदिर परिसरांत सांस्कृतिक कार्यक्रम विविध निमित्ताने घेण्याचा निर्धार गावकर्‍यांनी केला आहे. मंदिराचे जिर्णोद्धाराचे काम जलद गतीने व्हावे ही गावकर्‍यांची तळमळ आहे. 

चौथे ठिकाण होते परभणी तालूक्यात असलेले जाम. या गावी जगदंबेचे प्राचीन मंदिर आहे. या मंदिरांवरील शिल्पांची दखल तज्ज्ञांनी आपल्या संशोधनात घेतली आहे. पण सखोल अभ्यासाची अजूनही गरज आहे. गावकर्‍यांना मंदिराचे महत्त्व पटल्याने त्यांनी परिसराची साफसफाई व मंदिराचा जिर्णाद्धार केलेला आहे. त्रिपुरारी पौर्णिमेला या मंदिरावर दिपोत्सव घेवून त्यांनी गावकर्‍यांत जागृती निर्माण केली. याच मंदिर परिसरांत सांस्कृतिक कार्यक्रम घेण्याबाबत सकारात्मकता गावकर्‍यांनी दाखवली आहे.

या चार गावांत झालेला दिपोत्सव आणि सांगितिक कार्यक्रम याचे महत्त्व यासाठी आहे की ही गावे अगदी तालूकाही नसलेली छोटी गावे आहेत. सहसा आपण सगळे सांस्कृतिक नियोजन करत असताना मोठी शहरे केंद्रभागी ठेवतो. त्यासाठी मोठे प्रयोजक मिळतात. पण लहान गावांतील प्राचीन स्थळांपाशी सांस्कृतिक उपक्रम करण्याला वेगळे महत्त्व आहे. एक तर आपली जी अतिशय अभिमानास्पद उज्वल परंपरा आहे तिचे जतन या निमित्ताने केले जाते, लहान गावांतील वातावरण सांस्कृतिक कलात्मकतेला पोषक आहे त्याचीही दखल घेतली जाते. पूर्वीच्या काळी मंदिरे ही कलेची आश्रयदाती होती. म्हणूनच चित्र संगीत शिल्प साहित्य मंदिर परिसरांत फुलले. आज मंदिरांवर धार्मिक अंगाने टिका करणारे हे विसरतात की ही ठिकाणं कलेची स्फुर्ती स्थळे आहेत. मध्वमुनीश्वर महाराजांची 300 वर्षांपूर्वीची पदे रचना आजही लोक गातात. त्याची बूज या निमित्ताने राखली जाते आहे. भरतनाट्यम शेंदूरवाद्याला सादर झाले. प्राचीन मंदिरं लेण्या आहेत त्यावरील नृत्य मुद्रा आजही अभ्यासकांना खुणावतात. त्याची दखल घेतल्या शिवाय पुढे जाताच येत नाही. जी वाद्ये या मंदिरांवर दर्शविली आहेत त्याचा सखोल अभ्यास केला जात आहे. लेण्यांमधील चित्रांवर तर जगभरचे अभ्यासक काम करत आहेत. 

नदीच्या काठी संस्कृती निर्माण झाली असं मानलं जातं. तसे पुरावेच मंदिरांच्या रूपाने उपलब्ध आहेत. मग याची आठवण म्हणून या मंदिरांच्या ठिक़ाणी सांस्कृतिक उपक्रमांचा विचार का केला जात नाही? 

सरकारी पातळीवर वेरूळ महोत्सव अयोजीत केला जात होता. त्या आयोजनाचे पुढे काय झाले ते आपण बाजूला ठेवू. पण असा विचार सर्वच प्राचीन मंदिर परिसरांत छोट्या प्रमाणात करण्याचा विचार आपण का करत नाही? त्यासाठी फारश्या निधीची गरजही नाही. अगदी छोट्या प्रमाणात अभिजात कलांसाठी काम करणारे झटणारे कलाकार कार्यकर्ते रसिक आणि स्थानिक गावकरी यांच्या सहकार्याने प्रत्येक मंदिर परिसरांत, नदीच्या घाटांवर, प्राचीन बारवांच्या परिसरांत सांस्कृतिक उपक्रम सहज शक्य आहेत. त्या निमित्ताने या स्थळांकडे लोकांचे लक्ष वेधले जाईल. पर्यटकांचे पाय इकडे वळतील. अभ्यासकही इथे येतील. या ठिकाणांचा अजून सखोल अभ्यास होईल. 

देवगिरी सांस्कृतिक प्रतिष्ठान यासाठी पुढाकार घेत आहे. आपल्या परिसरांतील अशा वास्तुंबद्दल आम्हाला जरूर कळवा. त्यांचे फोटो पाठवा. त्या त्या ठिकाणी सांस्कृतिक कार्यक्रमाचे नियोजन करा. आम्ही सर्व मदत करण्यास तयार आहोत. इतिहास प्रेमी मंदिर मुर्ती प्रेमी रसिकांनी जरूर संपर्क साधावा. या चळवळीत सहयोग नोंदवावा. 

(हे केवळ हिंदूंसाठी आहे असे नाही. औरंगाबाद परिसरांतील शेकडो मजारी धुळखात पडून आहेत. बौद्ध लेण्याची अवस्थाही अतिशय वाईट आहे. त्यावर मी सविस्तर लिहीणार आहेच नंतर. तेंव्हा हा उपक्रम सर्वांसाठीच आहे.)    

     

         श्रीकांत उमरीकर, जनशक्ती वाचक चळवळ, औरंगाबाद 9422878575 

  गावकर्‍यांनी जिर्णाद्धार केलेले प्राचीन शिवमंदिर जामखेड (ता. अंबड जि. जालना)


 उरूस, 2 ऑक्टोबर 2020 

 हजार वर्षांचे एक प्राचीन शिवमंदिर जामखेड (ता. अंबड जि. जालना) या गावात आहे. एकेकाळी बाहेरून पूर्णत: ढासळलेले हे मंदिर गाभारा, गर्भगृह, मुखमंडप व 20 कोरीव खांब असे संपूर्ण सुरक्षीत होते. परिसरांत बाभळी व काटेरी झुडूपे वाढली होती. मंदिराला अर्धचंद्राकार वेढा घातलेली घामवती नदी सहसा कोरडीच असायची. गावकर्‍यांनी या परिसराची स्वच्छता व मंदिराची दुरूस्ती करण्याचे मनावर घेतले. आज हे मंदिर अतिशय चांगल्या अवस्थेत उभे आहे. सर्व परिसर समतल करण्यात आला आहे. मंदिरासमोर पिंपळाचे मोठे झाड आहे. त्याची सावली संपूर्ण परिसराला आल्हाददायक बनविते. 

जामखेडचे हे शिवमंदिर खडकेश्वर महादेव म्हणून ओळखले जाते. जामखेड या गावाबद्दल पौराणिक आख्यायिका आहे. जाबुवंत आणि हनुमानाची लढाई याच गावात झाल्याचे सांगितले जाते. गावजवळच्या टेकडीवर जाबुवंताचे मंदिर आहे. हे मंदिर म्हणजे डोंगरातील कपारीत कोरलेली एक गुहाच आहे. इथे लेणी कोरण्याचा प्रयास झाला होता. पण दगड ठिसुळ असल्याने हे काम अर्धवट सोडण्यात आले. याच जागी आता जांबुवंताचे मंदिर आहे. या परिसरांतील 12 गावांमध्ये हनुमानाचे मंदिर आढळत नाही. नसता मारूतीचे मंदिर नाही असे एकही गाव नसते. पण हा परिसर याला अपवाद आहे. जांबुवंत व हनुमानाच्या लढाईत जाबुवंताचा घाम गळाला म्हणून या गावच्या नदीचे नावच ‘घामवती’ असे आहे. 

याच घामवती नदीच्या काठावर खडकेश्वर महादेवाचे हे प्राचीन मंदिर उभे आहे. या गावात नदीला पाणी आले असे म्हणत नाहीत. तर घाम आला असे म्हणतात. 

मराठवाड्यात अकराव्या शतकांतील आठ मंदिरे नोंदवल्या गेली आहेत. खडकेश्वराचे मंदिर हे त्यातीलच एक. (याच ब्लॉगमधील पूर्वीच्या लेखात अशा मंदिरांची यादीच दिली आहे.) मूळचे मंदिर भक्कम उंच चौथर्‍यावर बांधल्या गेले असावे. आज हा चौथरा मातीत बुजला असून जमिन सपाटीवर आता मंदिराचा मुखमंडप आलेला आहे. 

मुखमंडपाला चार देखणे कोरीव अर्धस्तंभ आहेत. हे स्तंभ चार फुट भिंतीवर उभारलेले असून त्यांनी छत तोलून धरले आहे. मंडपालाआठ कोरीव स्तंभ असून अष्टकोनी रंगपीठावर हा मंडप उभा आहे. या स्तंभांवर सुंदर असे कोरीव शिल्पकाम केले आहे. हत्तीवर बसून लढणार्‍या स्त्रीयोद्धा, शेषशायी विष्णू,  नृत्यांगना अगदी हनुमान व जांबुवंत यांच्या लढाईचे पण शिल्प या स्तंभांवर कोरलेले आहे. मंदिराला एकूण 20 नक्षीदार स्तंभ आहेत. 


मंदिराच्या बाह्य अंगावर अप्रतिम असे शिल्पकाम असावे असा अंदाज आहे. कारण मुखमंडपाच्या बाहेरच्या भागातील काही शिल्पे आजही चांगल्या अवस्थेत दिसून येतात. बाहेरचा भाग संपूर्णच ढासळलेला होता. तेंव्हा तो घडीव दगडांनी लिंपून घेत बाह्य भिंत उभारल्या गेली आहे. तेंव्हा आता इथे एकही शिल्प दिसत नाही. 

मंदिराला मुख्य गर्भगृह आणि दोन उपगृहे वाटाव्यात अशा रचना आढळून येतात. डॉ. प्रभाकर देव यांनी आपल्या पुस्तकांत असे नोंदवले आहे की 11 व्या शतकांतील मंदिर शैली विकसित पावून 12 व्या शतकांत त्रिदल पद्धतीची मंदिरे मराठवाड्यात उभारल्या जावू लागली. हा जो मंदिर शैलीचा सांधा आहे त्याचा पुरावा या जामखेडच्या मंदिरात आढळून येतो. एकल गर्भगृह असलेले अन्वा (ता. भोकरदन जि. जालना) आणि त्रिदल पद्धतीतील आता उद्ध्वस्त असलेले केसापुरी (ता. माजलगांव, जि. बीड) या दोन मदिरांच्या अंतराच्या दृष्टीने अगदी मध्ये खडकेश्वर महादेव मंदिर आहे. आणि नेमके शैलीच्या दृष्टीनेही हे मंदिर मध्यभागी आहे. हा एक विलक्षण योगायोग आहे. 

खडकेश्वर मंदिराच्या गर्भगृहाला चार द्वारशाखा आहेत. या द्वारशाखांच्या पायाशी शैव द्वारपाल आहेत. मंदिरातील देवकोष्टकांत एका ठिकाणी गणेशाची मुर्ती आहे. दुसर्‍यात विष्णुची वराह अवतारातील मुर्ती आहे. उमा महेश्वराची पण मुर्ती आढळून येते. 


मंदिराच्या बाहेर परिसरांत दोन भग्न मुर्ती आणि भव्य नंदीचे अवशेष आढळून येतात. हे जर मंदिरातील असतील तर मुळ मंदिर अतिशय भव्य असावे असा अंदाज बांधावा लागतो. सध्या जो नंदी आहे तो लहान आहे. नंदीला स्वतंत्र असा मंडप आहे. या मंडपाचेही छत ढासळले होते. गावकर्‍यांनी मंदिर दुरूस्त करताना नंदी मंडपाचेही छत दुरूस्त केले. चार खांबांवर हा छोटासा देखणा नंदीमंडप मंदिराच्या समोर उभारलेला आहे. खडकेश्वर मंदिर पश्चिममुखी आहे.


या परिसरांत पर्णकुटी बांधून सच्चीदानंद श्रीधर स्वामी कावसानकर (नाना काका महाराज) यांनी वास्तव्य केले. शिवस्वरूप वैकुंठवासी विनोदबाबा दाणे यांनीही या मंदिराच्या जिर्णोद्धाराचे काम मनावर घेतले. या दोन सत्पुरूषांची प्रेरणा मिळाल्यावर गावकर्‍यांनी उत्साहाने कामाला सुरवात केली.  


गावकर्‍यांची या मंदिरावर श्रद्धा असल्याने त्यांनी उत्स्फुर्तपणे वर्गणी गोळा करून मंदिराचा जिर्णाद्धार केला. दगडूअप्पा सांगोळे आणि अशोक जाधव यांच्यासारखी मंडळी आजही तळमळीने मंदिरासाठी झटत आहेत. या मंदिराची नोंद पुरातत्त्व विभागाकडे आहे. पण कुठलाही निधी याला मिळालेला नाही. एकीकडे आपल्याकडे प्राचीन मंदिरांची दूरावस्था आढळून येते आणि दुसरीकडे जामखेडची मंडळी स्वयंस्फुर्तपणे काम करत आहेत तर त्याकडेही आपण लक्ष द्यायला तयार नाहीत. ही एक शोकांतिकाच आहे. 

जामखेडच्या खडकेश्वर महादेव मंदिराकडे अभ्यासकांचे लक्ष्य जाण्याची गरज आहे. यातील शिल्पांवर अजून बारकाईने अभ्यास व्हायला हवा. डॉ. प्रभाकर देव, डॉ. देगलुरकर, डॉ. अरूणचंद्र पाठक यांनी मंदिराची दखल आपल्या पुस्तकांत घेतली आहे. त्यामुळेच या मंदिराचे महत्त्व समोर आले. मंदिर परिसरांत उत्खनन केल्यास मंदिराचा विस्तारीत पाया सापडू शकतो. मंदिर एका उंच चौथर्‍यावर उभे असण्याची शक्यता आहे. संपूर्ण उत्खनन झाल्यास मंदिराचा तलविन्यास संपूर्णपणे लक्षात येईल. हे मंदिर अगदी प्राचीन मंदिरांपैकी एक असल्याने त्याचे महत्त्व फार मोठे आहे.

औरंगाबाद बीड रस्त्यावर अडूळच्या अलीकडे जामखेडकडे जाणारा फाटा फुटतो. मुख्य रस्त्यापासून आत वळल्यावर अगदी चार किमी अंतरावर हे गाव आहे. गावापर्यंत अगदी चांगला रस्ता आता तयार झाला आहे. मंदिर स्थापत्याच्या अभ्यासकांनी, इतिहासप्रेमींनी, हौशी पर्यटकांनी या मंदिराला जरूर भेट द्यावी. आतापर्यंत कुणाच्या लक्षात आले नसेल असे काही पैलू समोर आणावेत.

(जामखेड मंदिरा संबंधी काही माहिती हवी असल्यास अशोक जाधव 9763892727 यांच्याशी संपर्क करावा.)

(देवगिरी सांस्कृतिक प्रतिष्ठानच्या वतीने प्राचीन मंदिरे मुर्ती वास्तू समाध्या मकबरे गढी वाडे यांच्या संवर्धन जतन संरक्षणासाठी अभियान राबविले जात आहे. आपल्या गावच्या अशा स्थळांबाबत माहिती आमच्यापर्यंत पोचवा. आमच्या अभियानात आपण सहभागी व्हा आणि आपल्याही गावच्या अशा कामासाठी आम्हाला सांगा.) (छायाचित्र सौजन्य Akvin Tourism)

            श्रीकांत उमरीकर, जनशक्ती वाचक चळवळ, औरंगाबाद 9422878575   

  सिमेंटने गिळले अंभईचे प्राचीन मंदिर


उरूस, 5 ऑक्टोबर 2020 

जून्या मंदिरांबाबत दोन मोठ्या अडचणींना तोंड द्यावे लागत आहे. एक तर उद्ध्वस्त प्राचीन मंदिरांचे अवशेष इततस्त: विखुरलेले असतात. यातील काही दगड लोकांनी सरळ उचलून नेले आणि त्यांचा वापर घरगुती कामांसाठी (धुणे धुण्यासाठी) केला किंवा बिनधास्तपणे बांधकामांसाठी त्यांचा वापर केलेला दिसून येतो. तर काही ठिकाणचे दगड दुसर्‍याच मंदिराच्या बांधकामासाठी वापरले (बीडच्या कंकालेश्वराचे मोठे ठळक उदाहरण आहे).

दुसरी विचित्र अडचण अशी आहे की जिर्णोद्धार करण्याच्या नावाखाली अशा मंदिरांची नविन पद्धतीने सिमेंट वीटांत बांधणी केली जाते. त्यात पुरातन अवशेष नष्ट होतात. त्यांची हेळसांड होते. सौंदर्यदृष्ट्याही हा जोड विजोडच ठरतो. महत्त्वाचे म्हणजे मंदिरांवरची नक्षी छोटी शिल्पे त्या द्वारे सांगितलेली गोष्ट त्यातील गुढ अर्थ याची अपरिमित हानी होते. काही ठिकाणी जून्या दगडी मंदिराला रंग/वॉर्निश फासून विद्रूपता आणली गेली आहे. 

अंभई (ता. सिल्लोड. जि. औरंगाबाद) येथील प्राचीन वडेश्वर शिव मंदिराबाबत दुसर्‍या प्रकारची अडचण आहे. 

डॉ. देगलुरकर, डॉ. प्रभाकर देव सारख्या विद्वानांनी या प्राचीन मंदिराचे महत्त्व आपल्या ग्रंथांत संशोधन प्रकल्पांत नमुद केले आहे. यावर सविस्तर लिहून ठेवले आहे. हे मंदिर बहुतांश उद्ध्वस्त झाले होते. मुळ पाया मातीत बुजून गेलेला होता. मुखमंडप आणि मुख्य मंडप कधीच नष्ट झाले होते. तिन गर्भगृहे आणि त्यांच्या बाह्य भिंती तेवढ्या शाबुत होत्या. शिखरेही ढासळलेली होती. गावकर्‍यांनी मंदिराचा जिर्णाद्धार करताना सिमेंटचे बंदिस्त सभागृह समोर बांधले. त्यांचा हेतू आणि तळमळ गैर नव्हती. पण त्यामुळे मंदिराचे मुळ रूपच नष्ट झाले. 

मराठवाड्यात एक गर्भगृह असलेली मंदिरे अकराव्या शतकातील अगदी मोजकीच अशी आहेत. त्यानंतर तिन गर्भगृह असलेली त्रिदल मंदिर शैली विकसीत झाली. अशा दुर्मिळ प्राचीन मंदिरापैकी एक म्हणजे वडेश्वरचे हे शिव मंदिर. 


मंदिराच्या तिन्ही गर्भगृहांवर अप्रतिम असे कोरीव काम आहे. मुख्य गर्भगृहात महादेवाची पिंड आहे. चार पद्धतीच्या द्वारशाखा आढळून येतात. मुख्य गर्भगृहाच्या प्रवेशद्वाराच्या उंबरठ्यावर किर्तीमुख आहे. ललाटबिंबावर गणेशाची मुर्ती कोरलेली आहे. चालुक्य शैलीचे या गर्भगृहाचे छत आहे. गर्भगृहाच्या अंतराळात देवकोष्टके आहेत. (अंतराळ म्हणजे मुख्य मंडप आणि गर्भगृह यांना जोडणारी जागा.) यात ब्राह्मी, सरस्वती, वैष्णवी यांच्या मुर्ती आहेत. हे मंदिर बाराव्या शतकातील आहे. 


डॉ. देगलुरकरांनी यातील एका विष्णु मुर्तीचा विशेष असा उल्लेख केला आहे. विष्णुची जी विविध नावे आहेत त्याप्रमाणे त्या त्या पद्धतीच्या मुर्ती मंदिरावर कोरलेल्या असतात. यातील उपेंद्र नावाने ओळखली जाणारी अतिशय दुर्मिळ अशी मुर्ती या मंदिरावर आढळून आली आहे. मुख्य गर्भगृहाच्या ललाटबिंबाच्या वर मध्यभागी ही उपेंद्र विष्णुची मुर्ती आहे. उपेंद्र मुर्तीची वैशिष्ट्य म्हणजे वरच्या उजव्या हातात गदा, खालचा उजवा हात वरदमुद्रेत, वरच्या डाव्या हातात चक्र आणि खालच्या डाव्या हातात पद्म असते. 


या मंदिरातील काही मिथून शिल्पे परिसरात मातीत पडली आहेत. मुख्यमंडपाचे काही अवशेषही तसेच इतस्तत: विखुरले आहेत. मुख्य गर्भगृहासमोर नंदी नाही. तो मंदिराबाहेर एका वेगळ्याच चौथर्‍यावर दिसतो आहे. लक्षात असे येते की हे मंदिर मुलत: शिवाचे असण्याची शक्यता नाही. ते देवीचे असावे किंवा विष्णुचे. (असे बहुतांश मंदिरांच्या बाबत झाले आहे. आक्रमणाच्या भितीने मुख्य मुर्ती हलवल्या गेली. कालांतराने तेथे घडविण्यास सोपी असलेली महादेवाची पिंड बसविण्यात आली.)   


मंदिराचा परिसर गावकर्‍यांनी स्वच्छ ठेवला आहे. मंदिरासमोर आणि बाजूला पेव्हर्स ब्लॉक बसवून त्यांनी जमिन समतल केली आहे. पण मागचा भाग व आपण प्रवेश करतो त्याची विरूद्ध बाजू मात्र अजूनही खराबच आहे. त्याच ठिकाणी शिल्पं विखुरलेली आहेत. 


जून्या मंदिरांचे जतन चांगल्या पद्धतीने कसे करता येवू शकते याचे तीन नमुने याच मराठवाड्यात समोर आहेत. अन्वा  (ता. भोकरदन जि. जालना) येथील मंदिराचा जिर्णोद्धार पुरातत्त्व विभागाने चांगल्या पद्धतीने केला आहे. सर्व परिसरांत दगडी फरशी बसवली आहे. आधारासाठी लोखंडी खांब उभे केले आहेत. निखळलेले दगड नीट बसवले आहेत. जिथले दगड सापडत नाहीत तिथे त्याच आकारात नविन दगड तासून बसवलेले आहेत. (पुरातत्त्व खात्यानेच गडचिरोली येथील मार्कंडा मंदिराचे काम अतिशय चांगल्या पद्धतीने चालविले आहे. अंबाजोगाई जवळ धर्मापुरी येथील मंदिराचे कामही याच खात्याने चांगले केले आहे.)

दुसरे अतिशय चांगले काम इंटॅक्ट या देश पातळीवरील नावाजलेल्या संस्थेने होट्टल (ता. देगलुर जि. नांदेड) येथे केले आहेत. दोन मंदिरांचा जिर्णोद्धार अतिशय शास्त्रीय पद्धतीने एक एक दगड हुडकून त्याची जागा शोधून तिथे तो बसवून करून दाखवला आहे. 

तिसरे काम जामखेड (ता. अंबड, जि. जालना) येथील खडकेश्वर शिव मंदिराबाबत गावकर्‍यांनी करून दाखवले आहे. साध्या दगडी घोटीव दगडांव बाह्य भिंत उभारून मंदिर सावरून धरले आहे. 

कुठल्याही जून्या मंदिराचे काम करावयाचे असल्यास कृपया त्या विषयातील तज्ज्ञांना विचारून करा. सिमेंट वीटांचा वापर करून रसायनिक रंग दगडांना फासुन विद्रुप करू नका. काहीच जमणार नसेल तर जसे आहे तसेच ठेवून किमान जागेची स्वच्छता आणि जवळपास विखुरलेले दगड शिल्पं एका ठिकाणी आणून ठेवले तरी पुरे. जनावरे येवू नयेत म्हणून जागेला संरक्षक असे तारेचे कुंपण घालण्यात यावे. तातडीने इतके तरी काम करा. शिवाय गावात इतरत्र आढळून येणारी शिल्पे कोरीव दगड मंदिर परिसरांत आणून ठेवा. 

दृश्य स्वरूपात जी मंदिरे किमान अस्तित्वात आहेत ज्यांचा अभ्यास झाला आहे अशा 11 व्या ते 14 व्या शतकांतील महाराष्ट्रातील 93 मंदिरांची यादी डॉ. गो.ब. देगलुरकरांनी आपल्या ग्रंथात दिली आहे. या शिवाय मराठवाड्यातील अगदी किमान अवशेष सापडले अशी ठिकाणे शोधून त्यांची एक यादी डॉ. प्रभाकर देव यांनी दिली आहे. अशी 114 ठिकाणं/ मंदिरे आहेत. आपआपल्या गावांत अशी पुरातन मंदिरे अवशेष कोरीव दगड वीरगळ, सतीचे दगड काही आढळूनआले तर आम्हाला जरूर कळवा. त्यांची छायाचित्रे पाठवा. संपूर्ण महाराष्ट्रातील मंदिरांचा कोश तयार करण्याची गरज आहे. या कामासाठी सहकार्य करण्याचे विविध संस्था/ व्यक्तींनी मान्य केले आहे. त्यासाठी आपण सगळे मिळून प्रयत्न करू या. हे काम संपूर्ण महाराष्ट्रात करावयाचे आहे. माझ्या स्वत:च्या मर्यादांमुळे सध्या मी मराठवाड्यात फिरतो आहे. पण तशी प्रदेशाची मर्यादा या कामाला नाही.    

(छायाचित्र सौजन्य Akvin Tourism)

    

      श्रीकांत उमरीकर, जनशक्ती वाचक चळवळ, औरंगाबाद 9422878575   


 माणकेश्वर मंदिरावरील अप्रतिम शिल्पाविष्कार


उरूस, 7 ऑक्टोबर 2020 

 महाराष्ट्रातील अगदी प्राचीन उत्तम शिल्पाविष्कारांनी नटलेली मंदिरे मोजायची झाल्यास एका हताची पाच बोटेही पुरेशी आहेत. अंबरनाथ बदलापुरचे शिवमंदिर, खिद्रापुरचे कोपेश्वर मंदिर, औंढ्याचे नागनाथ मंदिर, अन्व्याचे मंदिर आणि पाचवे नाव घ्यावे लागते ते माणकेश्वर (ता. परंडा  जि. उस्मानाबाद) च्या मंदिराचेच.हीच नावं का घ्यायची तर या मंदिरांच्या बाह्य भिंतींवरील (जंघा) अप्रतिम असा शिल्पाविष्कार. आणि दुसरं म्हणजे यांचे प्राचीनत्व. 

माणकेश्वर मंदिर बाराव्या शतकांतील आहे. औरंगाबाद उस्मानाबाद रस्त्यावर कुंथलगिरीपासून उजव्या हाताच्या रस्त्याला वळलो की डोंगररांगांतून एक छानसा रस्ता जातो. टेकड्या हिरवळ तळे असा निसर्गसुंदर परिसर. या रस्त्याने भूम पर्यंत गेल्यावर तेथून 11 किमी दक्षिणेला माणकेश्वर गाव आहे. विश्वकर्मा नदीच्या चंद्राकृती वळणावरची नयनरम्य जागा शोधून या मंदिराची उभारणी केल्या गेली आहे.


एका उंचपीठावर तारकाकृती अशी मंदिराची रचना आहे. पायर्‍या चढून मुखमंडपाकडे गेल्यावर तेथून संपूर्ण मंदिराला प्रदक्षिणा पथ आहे. मंदिराच्या मुखमंडपातून आत शिरल्यावर मुख्यमंडप लागतो. त्याच्या मध्याशी चौकोनी अशी रंगशीळा आहे. या मंडपाला 20 सुंदर स्तंभांनी तोलले आहे. यातील चार प्रमुख स्तंभांवर अप्रतिम असे कोरीवकाम आढळते. होयसळेश्वर मंदिरावर आढळून येणारे अतिशय बारीक असे कोरीवकाम या स्तंभांवर आहे. सोन्याच्या बांगड्यांवर ज्या पद्धतीने नक्षीकाम केलेले आजकाल दिसून येते त्याचे नमुने माणकेश्वर मंदिरावरच्या खांबांवर आढळून येतात. यातील  नक्षीकामात कोरलेले मणी तर इतके बारीक आणि सुंदर आहेत ते दगडाचे आहेत म्हणून नसता मोत्याचेच वाटावेत असे सुबक आणि सुंदर आहेत. 


माणकेश्वर मंदिराचे सगळ्यात मोठे आणि वेगळेपण त्याच्या गर्भगृहाच्या द्वारशाखेत आहे. डॉ. गो.ब.देगलुरकरांसारख्या अभ्यासकांने हे वेगळेपण नोंदवून ठेवले आहे. गर्भगृहाच्या चौकटीवर कोरीवकाम केलेली पट्टी असते. ही सहसा तीन किंवा चार या प्रमाणात असते. म्हणजे एक पट्टी फुलांची नक्षीची, त्यामागे दुसरी पट्टी पानांची, तिसरी पट्टी नृत्य करणार्‍या स्त्री पुरूषांची. पण हे एकमेव असे मंदिर महाराष्ट्रात आढळले आहे जिथे एक दोन नव्हे तर सात द्वारशाखा आहेत. 

मंदिराचा बाह्यभाग अप्रतिम अशा सुरसुंदरींच्या शिल्पांनी व इतर देवतांच्या शिल्पांनी नटलेला आहे. सगळ्यात खालचा नक्षीचा थर हा गजथर आहे. याच्यावरती नरथर म्हणजेच स्त्री पुरूषांचा गायन वादन करणार्‍यांचा आहे. 


मंदिरावर बाह्य भागात एकूण 109 सुंदर मुर्ती आहेत. आतील मुर्तींची संख्या गृहीत धरल्यास एकूण 347 मुर्ती अभ्यासकांनी नोंदवल्या आहेत. वीणा वादन करणारी सरस्वती, बासरी वाजविणारा कृष्ण, मृदंग वाजविणारी सुंदरी, चतुर्भज दोन हातात घंटा असलेली नृत्य मुर्ती, तंतुवाद्य वाजविणारी सुंदरी, डमरुधारी शिव असे संगीतविषयक संदर्भ असलेली शिल्पे या मंदिराचे वैशिष्ट्य मानले जातात. केवल शिव, ऐरावतधारी इंद्र, ब्रह्मदेव, लक्ष्मी या मुर्तीही मंदिराचे वैशिष्ट्य आहे. हरिहर म्हणजेच विष्णु आणि शिव यांची संयुक्त मुर्ती. अशी मुर्ती माणकेश्वर मंदिरावर आढळून आली आहे.


मंदिराच्या समोर एका मंडपाचा चौथरा दिसून येतो. त्यावरचा अप्रतिम असा गजथर अजूनही शाबुत आहे. पण बाकी मंडप कोसळलेला आहे. इथे सध्या एक नंदी ठेवलेला आढळतो. मंदिराला मकरप्रणाल (गाभार्‍यातील अभिषेकाचे पाणी बाहेर जाण्याची जागा) आहे. त्यावर दोन निष्कर्ष निघतात. एक तर या मंदिराचा कालाखंड मध्ययुगाच्या मागे जातो. दुसरं म्हणजे हे शिव मंदिर नसून विष्णु मंदिर असण्याची जास्त शक्यता आहे. कारण शिवमंदिराला गोमुख असते. (अर्थात या सगळ्यांना अपवाद आहेत. यावर विविध तज्ज्ञांनी आपली मते नोंदवून ठेवली आहेत.) 


अणदुरच्या शिलालेखात या मंदिराला अनुदान दिल्याचा संदर्भ सापडलेला आहे. त्यावरून याचा कालखंड 12 व्या शतकातला असल्याचे सिद्ध होते. 

मंदिर त्रिदल पद्धतीचे (तीन गर्भगृह असलेले) आहे. ही पद्धत मराठवाड्यात मंदिर शैलीतील विकसित अशा कालखंडातील मानली जाते. 

या सुंदर प्राचीन अद्वितीय शिल्पसौंदर्याने नटलेल्या मंदिराच्या बाजूलाच नविन झालेले सटवाईचे मंदिर आहे. इथे लहान मुलाचे जावळं काढण्यासाठी मोठ्या प्रमाणात भाविक गर्दी करतात. मंदिराच्या परिसरांतच बोकड कापल्या जातो. सगळा परिसर त्याने अस्वच्छ होतो. माणकेश्वर मंदिराच्या परिसरांत प्राचीन मुर्तींचे अवशेष आढळून येतात. मंदिरासमोरचा सभामंडप आहे तेथे मोठा शिल्पाविष्कार एकेकाळी असावा. त्याचे अवशेष अजूनही आजूबाजूला सापडतात. तेंव्हा हा सगळा परिसर संरक्षीत करण्याची नितांत गरज आहे.

बाजूच्या सटवाई मंदिराला वेगळी संरक्षक भिंत करून त्याचा परिसर वेगळा केला पाहिजे. नदीच्या काठावर सुंदरसा घाट बांधून या परिसराला रम्य बनवता येईल. आम्ही जेंव्हा सुदाम पाटील, सरपंच विशाल अंधारे,  भाजप जिल्हाध्यक्ष माझे मित्र नितीन काळे  या प्रतिष्ठीत लोकांशी बोललो तेंव्हा त्यांनी यासाठी अनुकुलता दाखवली. अशी पुरातन मंदिरे हा फार मोठा ऐतिहासिक मोलाचा ठेवा आहे. तो आपण जतन करायला पाहिजे. अशी मंदिरे आज बांधता येत नाहीत. तर निदान त्यांचे जतन तरी काळजीपूर्वक केले पाहिजे.

(या लिखाणासाठी माया पाटील शहापुरकर, डाॅ. गो.ब. देगलुरकर, डाॅ. प्रभाकर देव यांच्या पुस्तकांतून संदर्भ घेतले आहेत. त्यांचे आभार)

(छायाचित्रे सौजन्य Akvin Tourism) 

    

          श्रीकांत उमरीकर, जनशक्ती वाचक चळवळ, औरंगाबाद 9422878575   

 अन्वा महादेव मंदिर : देखणा शिल्पाविष्कार!

 

उरूस, 19 सप्टेंबर 2020 

अजिंठा डोंगररांगा आणि परिसरांत अतिशय अप्रतिम असे निसर्गसौंदर्य आहे, कातळात कोरलेल्या लेण्या आहेत. या शिवाय दोन अतिशय प्राचीन अशी मंदिरे आहेत. ही मंदिरे महाराष्ट्राच्या एकुणच मंदिर स्थापत्य शैलीच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाची मानली जातात. यातील जंजाळा किल्ल्या जवळचे अंभईचे वडेश्वर मंदिर हे त्रिदल पद्धतीचे पण त्याची बरीच पडझड झालेली आहे. नविन बांधकाम करताना जून्या बर्‍याच गोष्टी नाहिशा झाल्या. 

पण दूसरे जे मंदिर वडेश्वरापेक्षा प्राचीन आणि अतिशय महत्त्वाचे आहे ते म्हणजे अन्वा येथील शिव मंदिर. हे मंदिर अजूनही चांगल्या अवस्थेत आहे. इ.स. 1000 ते 1100 या काळातील आठ महत्त्वाची मंदिरे मराठवाड्यात आहेत.    त्यापैकी हे एक अतिशय सुंदर सुबक असा शिल्पाविष्कार असलेले मंदिर.

औरंगाबाद अजिंठा मार्गावर अजिंठ्याच्या अलीकडे गोळेगांव वरून डाव्या बाजूला जो रस्ता आत जातो त्याच रस्त्यावर 8 कि.मी. अंतरावरील अन्वा गावात हे मंदिर आहे. मंदिराच्या परिसरांची अतिशच चांगली बांधबंदिस्ती दुरूस्ती पुरातत्व खात्याने केली आहे. मंदिराची संरक्षक भिंत उभारल्या गेली आहे. संपूर्ण परिसरांत दगडी फरशी बसवली आहे. मंदिराचीही डागडुजी करण्यात आली आहे. मंदिराला लोखंडी खांबांचा आधार देवून पुढील पडझड होण्यापासून वाचवले आहे. 


हे मंदिर उत्तर चालूक्यांच्या काळातील आहे. याला लागूनच भोकरदन ही एकेकाळची राष्ट्रकुटाची राजधानी असलेले गाव आहे. राष्ट्रकुटांची सत्ता लयाला गेल्यावर या परिसरावर उत्तर चालुक्यांची सत्ता होती. त्या काळातील हे मंदिर आहे.

अन्व्याच्या तूल्यबळ त्याकाळातील फारच थोडी मंदिरे महाराष्ट्रात आहेत. बदलापुर अंबरनाथचे शिवमंदिर, कोल्हापूरजवळील खिद्रापूरचे कोपेश्वर शिवमंदिर शिवाय विदर्भातील काही मंदिरे या काळातील आहेत.

अतिशय देखणे असे कोरीव स्तंभ हे या मंदिराचे वैशिष्ट्य आहे. पाच सहा फुटी उंच पीठावर हे मंदिर विराजमान आहे. मंदिर पूर्वाभिमुखी असून त्याला दक्षिण आणि उत्तर दिशेनेही पायर्‍या आहेत. तिन्ही बाजूच्या पायर्‍यांवरून आपण प्रदक्षिणापथावर येतो. पण मंदिरात प्रवेश मात्र फक्त पूर्व दिशेनेच ठेवलेला आहे. 

एक दोन नाही तर तब्बल 50 कोरीव देखण्या स्तंभावर हे मंदिर तोलल्या गेलेले आहे. मंदिराच्या बाह्यभागावर अतिशय सुंदर नाजूक असे मुर्तीकाम केलेले आहेत. या मंदिराचे वैशिष्ट्य म्हणजे विष्णूच्या शक्ती रूपातील म्हणजेच स्त्रीरूपातील मुर्ती. अशा मुर्ती फारशा कुठे आढळून आल्याची नोंद नाही. विष्णूची शंख, चक्र, गदा व पद्म ही चारही चिन्हे या मुर्तींच्या चार हातात आहेत. त्या स्त्रीरूपात दाखविल्या म्हणजे त्या मूर्ती लक्ष्मीच्या नाहीत. यांना विष्णूची शक्ती असे संबोधले गेलीे आहे. 


गर्भगृहाचे द्वार अतिशय कोरीव कामगिरीने नटलेले आहे. एकानंतर एक अशा चार द्वारशाखा या ठिकाणी आढळून येतात. गर्भगृहात मध्यावर महादेवाची पिंड आहे. 

मंदिराच्या मंडप छताला मध्यभागी अर्धवट उमलते खाली लोबलेले फुल कोरलेले आहे. त्याच्या भोवती आठ दिशांना म्हणून आठ फुले कोरलेली आहेत. ही सर्व रचना एक चौरस दगडी चौकटीत  बसवलेली आहे. मंडपाच्या जमिनीवर वर्तूळाकार असे उंचावलेले पीठ आहे. त्यावर नंदी बसवलेला आहे. तिन्ही बाजूला बसण्यासाठी ओटे आहेत. खांबांची रचना अशी आहे की कुठेही बसले तरी सभामंडपाच्या मध्यभागी आपण पाहू शकतो. एकही खांब मध्ये येत नाही. यावर हा अंदाज लावता येतो की या ठिकाणी नृत्य, संगीत सेवा अर्पण केली जात असावी. आणि त्यासाठी गर्भगृहाची दिशा सोडून इतर तिनही ठिकाणी लोक बसून त्याचा आनंद घेत असावेत.


भारतीय परंपरेत पुजेचे दोन प्रकार सांगितले आहेत. एक म्हणजे रंगभोग आणि दुसरा अंगभोग. धुप दिप वस्त्र फुले गंध अक्षता या सगळ्याला अंगभोग म्हणतात. तर रंगभोग म्हणजे गायन वादन नृत्य. मंडपाच्या रचनेवरून येथे रंगभोग पद्धतीने पुजा होत असावी. याला पुरावा म्हणजे गायन वादन करणारे भक्त या मंदिरावर कोरलेल्या शिल्पांमधून दिसून येतात. अशीच शिल्पे होट्टल आणि धर्मापुरी येथेही आढळून आलेले आहेत.  

मंदिराच्या बाह्यभागात गजलक्ष्मी आणि नृसिंह शिल्पे देवकोष्टकांत बसवलेली आहे. ती खुप देखणी आहेत. मंदिराच्या  बाह्य भागात हंसपट्टीका, सिंहपट्टीका आढळून येतात. 

अन्व्याच्या मंदिराचा परिसर आता स्वच्छ करण्यात आला आहे. पण मंदिर संरक्षक भिंतीच्या बाहेरील परिसरांत मात्र घाण बकालीचा अनुभव येतो. ग्रामपंचायतीने याची जबाबदारी घेवून मंदिरालगतचा भाग स्वच्छ चांगला केला तर मंदिराचे सौंदर्य वाढेल. पर्यटकांना इथपर्यंत आणता येईल पण परिसराची बकाली पाहून तो परत येण्याची शक्यता नाही.

हे मंदिर पूर्वी विष्णुचे अथवा लक्ष्मीचे असावे असा अंदाज बाहेरील शिल्पांवरून वर्तवल्या जातो. पण अर्थात हा अभ्यासकांचा विषय आहे. सामान्य दर्शकाला शिल्पांचे सौंदर्य न्याहाळायचे असते. हे शिल्पसौंदर्य पाहून तो विस्मयचकित होतो. एक हजार वर्षांपूर्वी हा प्रदेश कलात्मकदृष्ट्या किती संपन्न होता याचा पुरावाच या मंदिरावरील अप्रतिम कोरीवकामातून मिळतो.

हा प्राचीन वारसा फार महत्त्वाचा आहे. आपल्या अगदी जवळच हे ठिकाण आहे. किमान एकदा तरी हे मंदिर नजरेखालून घातले पाहिजे.   

(अन्व्या शिवायची इ.स. 1000 ते इ.स. 1100 काळातील मराठवाड्यातील महत्वाची सुंदस मंदिरे - 1. खडकेश्वर मंदिर जामखेड, ता. अंबड जि. जालना, 2. केदारेश्वर मंदिर, धर्मापुरी, ता, अंबाजोगाई जि. बीड, 3. सिद्धेश्वर मंदिर होट्टल, ता. देगलूर जि. नांदेड, 4. सोमेश्वर मंदिर, होट्टल 5. विठ्ठल मंदिर पानगांव, ता. परळी, जि. बीड 6. नागनाथ मंदिर, औंढा, जि. हिंगोली 7. गुप्तेश्वर मंदिर, धारासूर ता. गंगाखेड, जि. परभणी.)

(इ.स. 1100 ते 1200 या काळातील त्रिदल पद्धतीची मंदिर शैली विकसित झाली. अशी सहा मंदिरे मरावाड्यात आहेत. 1. निळकंठेश्वर मंदिर निलंगा, जि. लातूर, 2. कंकाळेश्वर मंदिर बीड, 3. शिवमंदिर उमरगा, जि. उस्मानाबाद 4. महादेव मंदिर माणकेश्वर, ता. परंडा, जि. उस्मानाबाद 5. वडेश्वर मंदिर, अंभई, ता.सिल्लोड, जि. औरंगाबाद 6. केशव मंदिर, केसापुरी ता. माजलगांव जि. बीड) 

(या लेखासाठी डॉ. प्रभाकर देव यांच्या ‘मराठवाड्यातील प्राचीन मंदिर स्थापत्य शिल्पाविष्कार’- अनुवाद सौ. कल्पना रायरीकर यांच्या पुस्तकाचा आधार घेतला आहे).  

(फोटो सौजन्य AKVIN tourism)  

  

      श्रीकांत उमरीकर, जनशक्ती वाचक चळवळ, औरंगाबाद 9422878575   

  वेताळवाडी : अजिंठा डोंगरातील एक दुर्लक्षीत किल्ला !



उरूस, 15 सप्टेंबर 2020 

 अजिंठा डोंगर रांगांतील रूद्रेश्वर लेणी, जंजाळा किल्ला व घटोत्कच लेणी यांवर मी याच सदरात लिहीले होते. त्याच मालिकेतील हा पुढचा लेख. संपूर्ण तटबंदी आणि दोन भव्य दरवाजे शाबूत असलेला अजिंठा डोंगर रांगेतील किल्ला म्हणजेच वेताळवाडीचा किल्ला. औरंगाबाद अजिंठा रस्त्यावर अजिंठ्याच्या अलीकडे गोळेगांवपासून डाव्या बाजूला एक  रस्ता फुटतो. हा रस्ता उंडणगाव मार्गे सोयगांवला जातो. याच रस्त्यावर हळदा घाटात तीन्ही दिशेने डोंगर रांगांनी वेढलेला असा हा वाडीचा किल्ला.  


किल्ल्याची संपूर्ण तटबंदी लांबूनच दिसते आणि त्याची भव्यता लक्षात येते. भोवताली डोंगर रांगा आणि मध्यभागी मोदक ठेवावा असा एक डोंगर. लांबट आकारात पसरलेला भव्य भक्कम बुरूज पहिल्यांदा आपले लक्ष वेधून घेतो. यादव राजा भिल्लम याच्या काळातील हा किल्ला असल्याचे तज्ज्ञ सांगतात. पण याची नेमकी माहिती उपलब्ध नाही. किल्ल्यावर एक तोफ पण सापडलेली आहे. तिच्यावरची चिन्हे आणि दरवाज्यावरची चिन्हे यांवरून किल्ला यादव काळातील असल्याची पुष्टी मिळते. 

किल्ल्याचे मुख्य प्रवेशद्वार तीन बुरूजांच्या त्रिकोणी रचनेतून तयार झालेले आहे. त्याची रचना इतकी अवघड आहे की शत्रूला सहजा सहजी मुख्यद्वार सापडू नये. हल्ला करण्यासाठी दरवाजा समोर जराही जागा मोकळी सोडलेली नाही. परिणामी या दरवाजासमोर शरण गेल्याशिवाय कुणाला त्यातून प्रवेशच मिळू शकत नाही. 


किल्ल्याचे प्रवेशद्वार, अगदी त्याला लागूनच असलेले द्वारपालाचे दालन, मुख्य बुरूजावर टेहेळणीसाठी बांधलेली झरोके झरोके असलेली माडी. या गॅलरीवजा सज्जाच्या कमानीतून समोरचे डोंगर आणि त्याच्या पायाशी असलेले तळे हे दृश्य मोठे कलात्मक दिसते.

किल्ल्याच्या प्रवेशद्वार आणि परिसराची डागडुजी पुरातत्त्व खात्याकडून चांगल्या प्रकारे करण्यात आलेली दिसून येते आहे. किल्ल्यावर सापडलेली एक मोठी लोखंडी तोफ लाकडी गाड्यावर बुरूजावर मांडून ठेवली आहे. किल्ल्यावर चढताना बालेकिल्ल्याची दुसरी तटबंदी लागते. ही संपूर्ण नसली तरी बर्‍याच जागी चांगल्या स्थितीत शाबूत आहे. बालेकिल्ल्याच्या एका महालाचा बुरूज पडक्या अवस्थेत आहे.


किल्ल्यावर धान्य साठवणुकीचे दोन भव्य दालनं चांगल्या अवस्थेतील आहेत. शिवाय एक अतिशय देखणे असे दगडी चिर्‍यांचे अष्टकोनी बांधीव तळे आहे. त्याच्या एका बाजूला पूर्वेला तोंड करून ‘जलमहाल’ आहे. याच्या तीन भिंती शिल्लक आहेत. दगडांवरील सुंदर कोरीव काम कोण्या एके काळी हा महाल अतिशय रसिकतेने उभारलेला असावा याची साक्ष देतात.

या किल्ल्यावरील सर्वात देखणी आणि सुंदर जागा म्हणजे उत्तर टोकावर असलेल्या हवामहलच्या शिल्लक चार कमानी. मराठवाडा आणि खान्देश यांना विभागणार्‍या डोंगरकड्यावरील टोकाचा बिंदू म्हणजे ही जागा. एकेकाळी सुंदर असा हवामहल या ठिकाणी होता. त्याची पडझड होवून महालाच्या चार कमानी आणि दोन भिंतीच आता शिल्लक आहेत. या कमानींमधून दूरवर पसरलेला खानदेशचा परिसर, सर्वत्र पसरेली शेते, जागजागी पाणी साठून तयार झालेली सुंदर तळी असे मोठे नयनरम्य दृश्य दिसून येते. याच किल्ल्याच्या डाव्या अंगाला सोयगाव धरणाचा पाणीसाठा डोळ्याचे पारणे फेडतो. किल्ल्याच्या उजव्या अंगाला प्रसिद्ध अशी रूद्रेश्वर लेणी आणि धबधबा आहे. 


अजिंठा डोंगराची नैसर्गिक अशी भव्य संरक्षक भिंत औरंगाबाद आणि जळगांवला विभागते. तेंव्हा या डोंगराच्या कड्यांवर चार किल्ले बांधल्या गेले आहेत. त्यांची रचना टेहेळणीचे संरक्षक किल्ले अशी असावी. हे चार किल्ले म्हणजे वाडिचा किल्ला, त्याच्या बाजूचा जंजाळ्याचा किल्ला, सुतोंड्याचा किल्ला आणि गवताळा अभयारण्या जवळचा अंतुरचा किल्ला. वाडीच्या किल्ल्यावरून जवळचा जंजाळा किल्ला आणि घटोत्कच लेणीचा डोंगर दिसतो.  

वाडीच्या किल्यावर हवामहलच्या बाजूने खाली उतरल्यास किल्ल्याचा उत्तरेकडचा म्हणजेच सोयगावच्या दिशेचा दरवाजा आढळतो.  दरवाजापासून आतपर्यंत डाव्या बाजूला ओवर्‍या ओवर्‍यांची वैशिष्ट्यपूर्ण रचना दिसून येते. कदाचित हा भाग किल्ल्यावरील बाजारपेठेसारखा असावा. उत्तरेकडील दरवाजापासून डाव्या हाताने तटबंदीला लागून चालत गेले तर आपण परत दक्षिणेकडील मुख्य दरवाजापाशी येतो.

वाडिच्या किल्ल्याजवळ डोंगरात उजव्या बाजूच्या (पूर्वेकडील) डोंगरात काही रिकाम्या लेण्या आहेत. हा परिसर अजिंठा लेणीच्या कालखंडात लेणी कोरण्यासाठी तपासला गेला होता. दगडा हवा तसा सापडला नाही म्हणून ही लेणी सोडून दिलेली दिसते. हौशी पर्यटकांसाठी अशा झाडांत लपलेल्या लेण्यांचा शोध घेणे हे एक आव्हान असते. 

वाडिचा किल्ला जून ते डिसेंबर काळात एक चांगले पर्यटन स्थळ म्हणून विकसित होवू शकते. किल्ल्यावरील माजलेली झाडी, झुडपे काढणे, हवामहल ते उत्तर दरवाजापर्यंत जाणारी चांगली पायवाट तयार करणे, मुख्य तटबंदीला लागून पर्यटकांना फिरण्यासाठी उत्तम पायवाट तयार करणे आवश्यक आहे.

किल्ल्याच्या प्रवेशद्वाराची जशी डागडुजी झाली आहे तशीच किल्ल्यावरील इतर भग्न अवशेषांची व्हायला हवी. 

जंजाळा किल्ला, घटोत्कच लेणी, वाडीचा किल्ला, रूद्रेश्वर लेणी, रूद्रेश्वर धबधबा, वडेश्वर महादेव मंदिर, मुर्डेश्वर देवस्थान असा हा अगदी एकमेकांच्या जवळ असलेला परिसर. औरंगाबादेहून पहाटे निघून जंगलात एक दिवसाचा मुक्काम (तशी चांगली सोय उंडणगावात व जवळच गणेशवाडीत उपलब्ध आहे) केल्यास दोन दिवसात सर्वच ठिकाणं पाहणं शक्य होते.

जळगांव कडून सोयगांव मार्गे आल्यास तर हा परिसर अजूनच जवळ आहे. अगदी अर्ध्याच अंतरावर आहे.

पर्यटनाचा एक वेगळा विचार पंतप्रधान मोदींनी मांडला आहे. प्रत्येक भारतीयाने वर्षातून किमान एकदा देशांतर्गत पर्यटनासाठी गेले पाहिजे. कोरोना काळात जास्त खर्चिक पर्यटन करण्यापेक्षा आपल्या जवळच्या अशा स्थळांना भेटी दिल्यास हा उद्देश सफल होईल.

या प्रदेशात हौशी पर्यटकांसोबतच अभ्यासक विद्यार्थी आल्यास त्यांच्याकडून इतिहासातील अजून काही लपलेल्या बाबींवर प्रकाश पडू शकतो.

(छायाचित्र सौजन्य -ऍक्वीन टूरिझम)  

      श्रीकांत उमरीकर, जनशक्ती वाचक चळवळ, औरंगाबाद 9422878575 

  घटोत्कच लेणीचा सुंदर निसर्ग आणि आपली अनास्था !


उरूस, 14 सप्टेंबर 2020 

 अजिंठा डोंगराचा परिसर विलक्षण अशा निसर्ग सौंदर्याने नटलेले आहे. इथल्या दगडाचा दर्जा पारखून दोन हजार वर्षांपूर्वीपासून इथे लेणी कोरल्या गेली आहेत. अजिंठा लेणी सर्वपरिचित आहे पण याशिवाय त्याच काळातील किंवा त्यापूर्वीचीही काही लेणी या डोंगरात आहेत. पितळखोरा लेणी तर अजिंठ्याच्या आधीची आहे. 

सिल्लोड तालूक्यात हळदा घाटात वाडीचा किल्ला आणि रूद्रेश्वर लेणी आहे. याच किल्ल्याच्या बाजूला दुसर्‍या घाटात आहे ऐतिहासिक जंजाळा किल्ला (याला वैश्यगड किंवा तलतमचा किल्लाही म्हणतात). याच किल्ल्यासमोरच्या दरीत घटोत्कच लेणी आहे. नितांत सुंदर अशा दाट जंगलाने हा परिसर वेढलेला आहे. जंजाळा किल्ला आणि घटोत्कच लेणी याच्या मध्ये दरीत आजूबाजूच्या शेत शिवारातून वाहत येणारे पाणी धबधबा बनून कोसळते. कोसळते म्हणण्यापेक्षा वहात येते असं म्हणणं जास्त संयुक्तीक आहे. हिंदीत ‘झरना’ असा जो शब्द आहे तो याला नेमका लागू पडतो. 


जून्या मोगल वास्तूंमध्ये दगडांवरून वहात जाणार्‍या पाण्याची कारंज्याजवळ रचना केलेली असते. तशीच रचना या अनोख्या धबधब्याची आहे. उंचावरून तिरक्या असलेल्या दगडावरून हे पाणी खळाळत येते. अन्य जागी उंच कड्यांवरून पाणी खाली झेप घेते. इथे अतिश वेगळी आणि वैशिष्ट्यपूर्ण अशी दगड रचना असल्याने या झर्‍याचे सौंदर्य वेगळेच जाणवते. (औरंगाबाद परिसरांत बिबीचा मकबरा, सोनेरी महाल, औरंगजेबाचा राजवाडा किलेअर्क, हिमायत बाग, विद्यापीठातील सलाबत खानाचा मकबरा अशा कितीतरी ठिकाणी दगडांवरून पाणी वाहण्याची सुंदर रचना केलेली आढळून येते.)

घटोत्कच लेणीला जायला मुळात रस्ताच नाही. अक्षरश: शेत शिवारांतून वाट काढत जावे लागते. स्थानिक माणसाच्या मदतीशिवाय लेणीचा रस्ता शोधणे अवघडच आहे. पुरातत्त्व खात्याने अगदी अशात प्रत्यक्ष लेणीपर्यंत डोंगरमाथ्यापासून नीट पायर्‍या खोदल्या आहेत. लेणीजवळही एक ओहोळ परत आडवा येतो. तो ओलांडून पाय पाण्यात भिजवूनच लेणीला जाता येते. लेणीजवळ पुरातत्त्व खात्याने माहितीचा फलक लावला आहे. एक रक्षक तिथे नेमला आहे जो की कधीच हजर नसतो.

महायान पंथातील ही पहिली लेणी आहे. वाकाटकांच्या काळातील ही लेणी अजिंठा लेणीला समकालीन अशी आहे. लेणीत एकच दालन आहे. वीस सुंदर भव्य खांबांवर एक मोठे सभागृह आहे. त्याच्या एका बाजूला बुद्धाची भव्य अशी धम्मचक्र परिवर्तन मुर्ती आहे. लेणीत फारसे कोरीव काम दिसून येत नाही. कदाचीत त्या काळात काढलेली चित्रे नष्ट झाली असावीत. ब्राह्मी भाषेतील एक शिलालेख लेणीच्या प्रवेशद्वाराच्या डाव्या बाजूला आहे. लेणी समोर प्रशस्त अशी जागा मोकळी सोडलेली आहे. लेणीला दोन खिडक्या आहेत. आतल्या अंधारातून बाहेर प्रवेशद्वार आणि खिडक्यांकडे पाहिल्यास खांबांमधून मोठे सुंदर चित्र दिसते. 


लेणी समोरची दरी पावसाळ्यात दगडावरून वाहणार्‍या पाण्याच्या आणि मोरांच्या आवाजाने भरून गेलेली असते. लेणीच्या अगदी समोर जंजाळा किल्ल्याचे अवशेष दिसतात किल्ल्याचा एक दरवाजा या दरीत उतरण्यासाठी आहे. तोच किल्ल्याचा दिल्ली दरवाजा म्हणून ओळखला जातो. तटबंदीचे थोडे अवशेष, दिल्ली दरवाजा, किल्ल्यावरील महाल आणि एक पडकी मस्जिद असे फारच थोडे अवशेष आता शिल्लक आहेत.

हा सगळा परिसर विलक्षण सुंदर आहे. सागाच्या हिरव्या गर्द वनराईने सगळा डोंगर भरून गेलेला आहे. घटोत्कच लेणी समोरच डोंगरात अजून लेणी कोरल्याच्या खुणा दाट झाडीतून डोकावताना दिसतात. ही लेणी रिकामी असून तिथे फारसे कोरीव काम नाही अशी माहिती स्थानिक हौशी गाईड अक्रम भाई यांनी दिली. 

हा परिसर हौशी पर्यटकांना आकर्षण ठरावा असाच आहे. पण याची किमान माहितीही पर्यटकांना होत नाही. अगदी गावात गेल्यावरही लेणीकडे जाणारा रस्ता सापडत नाही. आता गावामधून जाणार्‍या सिमेेंट रस्त्याचे काम चालू आहे. पण मार्गात येणार्‍या शेतकर्‍यांनी रस्ता आडवून ठेवला आहे. 

ऐतिहासिक पुराण वास्तूंबाबत आपली अनास्था जागजागी दिसून येते. दोन हजार वर्षांपूर्वीचा सुंदर वारसा जवळ आहे आणि त्याकडे जाणारा साधा रस्ता आपण आजतागायत बांधू शकलो नाही याची अत्यंत खंत वाटते. लेणीच्या शोधात आमच्यासोबत असलेला फ्रेंच मित्र व्हिन्सेंट वाटेत शेवाळलेल्या दगडांवरून पाय घसरून कॅमेर्‍यासह पडला. एक भारतीय म्हणून आणि त्याचा मित्र म्हणून मला विलक्षण शरम वाटली. कुणीतरी आपला ऐतिहासिक दिव्य वारसा आपली वास्तूकला आपली शिल्पं आपल्या परंपरा यांचा शोध घेत धडपडत आहे आणि आपण किमान सोयीही पुरवू शकत नाही ही फारच शोकांतिका आहे. 

बरं केवळ या लेणीसाठी रस्ता करायला पाहिजे असेही नाही. अगदी लेणीच्या जवळ जंजाळा या गावातील लोकांसाठीही याची गरज आहे. भराडीपासून अंभईपर्यंत किंवा उंडणगावपासून अंभईपर्यंत बर्‍यापैकी रस्ता आहे. तिथपासून जंजाळ्यापर्यंत चांगला रस्ता करणे हे केवळ लेणीच नाही तर येथील लोकसंख्येसाठीही आवश्यक आहे.

याच वाटेवर अंभई जवळ वडेश्वराचे पुरातन महादेव मंदिर आहे. तेही पुरातत्त्व खात्याने नोंदीकृत केले आहे. त्या ऐतिहासिक वास्तुसाठीही रस्ता गरजेचा आहे.  

प्रत्यक्ष लेणी आणि त्या परिसरांतील घाण, आतमध्ये मोकाट जनावरे शिरून त्यांनी टाकलेले शेणाचे पोवटे, वटवाघळांनी केेलेली घाण या तर अजून वेगळ्या बाबी. पण इथपर्यंत येण्यासाठी आपण किमान वाटही करू शकत नाही याला काय म्हणावे? बारमाही रस्ते ही बाब महत्त्वाची आहे. मग याचा उपयोग करून इथे बाहेरचे लोक येवू शकतात. त्यामुळे पर्यटनाला चालना मिळू शकते. चलनवलन वाढू शकते. आणि त्यामुळे त्या भागातील अर्थकारणाला गती येवू शकते. पण आपण याचा विचार करत नाही. 

आम्हाला वाट दाखविणारे अक्रम भाई हौसेने आलेल्या पर्यटकांना लेणी दाखवतात, किल्ला दाखवतात, डोंगरावर फिरून आणतात. त्यांच्याच छोट्याश्या झोपडीवजा घरामसोर बसून चहाची खाण्याची व्यवस्था कुणी सांगितले तर ते करतात.  ही सामान्य माणसे आणि व्हिन्सेंट सारखे परदेशी पर्यटक/अभ्यासक विनातक्रार हे सर्व करत आहेत. आणि ज्यांच्या हातात निर्णयाचे अधिकार आहेत, सत्ता आहे ते मख्ख बसून आहेत. 

केवळ सरकारच नव्हे तर त्या त्या परिसरांतील लोकांची अनास्था पण याला कारणीभूत आहे. किमान स्वच्छता, किमान सोयी स्थानिक स्वराज्य संस्था करू शकते. त्यासाठी सरकारी यंत्रणेकडे पाठपुरावा करू शकते. 


अजिंठा डोंगराचा दिडदोनशे किलोमिटरचा पट्टा हा विलक्षण निसर्ग सौंदर्याने नटलेला आहे. या परिसरांत अभयारण्ये, लेण्या, मंदिरे, किल्ले दर्‍या डोंगर धबधबे असे पर्यटनाचे विविध पैलू उपलब्ध आहेत. सर्व परिसरांत अग्रक्रमाने बारमाही चांगले पक्के रस्ते पहिल्यांदा निर्माण करण्याची गरज आहे. नुसतं या परिसरांत फिरले तरी आनंदाची अनुभूती सामान्य पर्यटकांना होवू शकते. आधी आपण आपल्या मनातील अनास्थेवर मात करू. मग स्थानिक प्रतिनिधींवर दडपण आणू. आणि मग राज्य व केंद्र सरकारवर दबाव तयार करून हा परिसर विशेष पर्यटन क्षेत्र म्हणून विकसित करूया. परत कुणी व्हिन्सेंट सारखा परदेशी हौशी पर्यटक/अभ्यासक रस्ता नाही म्हणून शेवाळलेल्या दगडांवरून पाय घसरून पडला असे व्हायला नको.      

(फोटो सौजन्य अॅक्विन टूरीझम, या भागातील भटकंतीसाठी मला छोट्या भावासारख्या असलेल्या नीलेश महाजनचे विशेष धन्यवाद)

श्रीकांत उमरीकर, जनशक्ती वाचक चळवळ, औरंगाबाद 9422878575   

    मालोजी राजांची अतिक्रमणाने वेढलेली समाधी !


उरूस, 4 सप्टेंबर 2020 

 वेरूळच्या घृष्णेश्वर मंदिराच्या मुख्य प्रवेशद्वाराच्या अगदी समोर टपर्‍यांनी वेढा घातलेली एक अतिशय जूनी दगडी समाशी आहे. ही समाधी शिवाजी महाराजांचे आजोबा मालोजी राजे भोसले यांची असल्याचे सांगितले जाते. या शिवाय मंदिराच्या डाव्या बाजूला अगदी संरक्षक भिंतीला लागून एक कबर आहे. कबरीच्या चार दरवाज्यांना लागून आठ कोरीव कातीव दगडी खांब आहेत. आतूनही ही कबर अतिशय चांगल्या अवस्थेत आहे. पण इथे कुणाला पुरलेलं दिसत नाही. ती जागा रिकामी आहे. या कबरीला जायला जागाच नाही. गच्च रानगवताने झाडा झुडूपांनी वेढलेला आहे हा परिसर. याला लागूनच पुढे शांतिगिरी महाराजांच्या आश्रम परिसरांत अजून एक छत्री आहे. 

या तिनही वास्तु अतिशय उपेक्षीत अशा आहेत. मालोजी राज्यांची समाधीचा दरवाजा पुरातत्व विभागाच्या रक्षकाने कुलूप लावून बंद केल्याने आत स्वच्छता राखलेली आढळून येते. बाकी सर्व परिसरांत घाण केलेली दारूच्या बाटल्या पडलेल्या आढळून येत आहेत. 


मुख्य रस्त्याच्या डाव्या बाजूलाच मालोजी राजांची गढी आणि भव्य असा पुतळा नव्याने उभा केला गेला आहे. मग ही जूनी समाधी का अशी उपेक्षीत ठेवल्या गेली? ही समाधी मालोजी राजांची नसून त्यांचे वडिल बाबाजी भोसले यांची असल्याचे पण सांगितले जाते. या बाबत नेमकी माहिती उपलब्ध होत नाही. 

मंदिरावर असलेले अप्रतिम असे कोरीवकाम, जून्या लाकडी वाड्यासारखी दगडावर कोरलेली नक्षी, सागवानी दरवाजे जसे असतात तसे तीन दगडी दरवाजे समाधीच्या तिन बाजूला आहेत. ते इतके हुबेहुब लाकडाचे वाटतात की आपण लाकूड समजून त्यांना ढकलू पाहतो. खिडक्यांच्या कमानी नक्षीच्या जून्या मंदिराच्या कमानींसारख्या वळणा वळणाच्या नक्षीने कोरलेल्या आहेत. 


लाकडी माळवदाला आधार देणारे खांब किंवा जून्या मंदिरावर यक्ष कोरले असतात तसे सुंदर अशी दगडी रचना समाधीच्या प्रदक्षिणा पथाला खालच्या बाजूने करण्यात आली आहे. समाधीच्या मुख्य घुमटाच्या भोवताली चारही बाजूने दोन दोन आणि कोपर्‍यावर एक असे एकूण बारा सुंदर छोटे मिनार आहेत.

हे सगळे बांधकाम निजामशाहीच्या काळातील आढळून येते. ही समाधी मालोजी राजांची असण्याची खात्री पटते कारण लखुजी जाधव यांची समाधी याच पद्धतीची सिंदखेड राजा येथे आहे. त्याच्या आधीचा कालखंड मालोजी राजांचा आहे. मालाजी राजांचा मृत्यू इंदपूरला झाल्याचे सांगण्यात येते. त्यावरून काही संशोधक ही समाधी मालोजी यांची नाही असे प्रतिपादन करतात. पण खुद्द लखोजी जाधव यांचाही मृत्यू देवगिरी किल्ल्यात झाला होता. त्यांची समाधी पण त्यांच्या मुळ गावी सिंदखेड राजा येथेच आहे. मालोजी राजांची गढी मंदिराच्या जवळच असल्याने ही समाधी त्यांचीच असण्याची जास्त शक्यता आहे. शिवाय शंभू महादेव हे भोसल्यांच कुलदैवत. तेंव्हा मंदिरा समोर समाधी असण्यासही एक संयुक्त कारण आहे. बाजूची रिकामी कबर कुणा सरदाराची असावी. पण त्याचे निधन दुसरीकडे झाले आणि मृतदेह तिथपर्यंत आणता आला नसल्याने ही जागा रिक्त राहिली. अशा पण काही कबरी याच परिसरांत आहेत. 


तिसरी जी समाधी आहे ती कुणाची आहे याची माहिती नाही. पायर्‍या नसल्याने गर्भगृहात जावून पहाता येत नाही. तिथे वटवाघुळांचा मुक्त संचार आहे. कसरत करत वर चढल्यावर गाभार्‍यात वटवाघूळांच्या विष्टेची प्रचंड घाण साठलेली दिसून येते. घाणीचा भपकारा इतका आहे की नाक झाकून घ्यावे लागते. ही समाधी आतून पूर्ण शाबूत आहे. बाहेरून बराचसा भाग ढासळला आहे. शिल्लक अवशेषांवरून मुळ समाधीची भव्यता आणि मुख्य म्हणजे नक्षीकामाचा दर्जा याची कल्पना येते.  


सुवर्णसिंहासनाचे पाय असतात तसे देखणे समाधीच्या चार कोपर्‍यात चार पाय कोरलेले आहेत. जे आजही संपूर्ण शाबूत आहेत. या समाधीला तळघर आहे. जे सध्या दगड लावून बूजून टाकलेले दिसते आहे. पश्चिमेच्या खिडकीला सुंदर नक्षीकाम केले असून राजस्थानी पद्धतीने समोर छज्जा काढला आहे. 


कबर, समाधी आणि छत्री असे तीनही प्रकार इथे आढळून येतात. इतिहास संशोधकांनी यावर अजून प्रकाश टाकायला हवा. मुळात घृष्णेश्वर परिसरांतील सर्व अतिक्रमणे हटवून तिथे स्वच्छता केली गेली पाहिजे. या जून्या वास्तूंभोवती संरक्षक भिंती उभारल्या गेल्या पाहिजेत. नुकतीच मलिक अंबर कबर आणि परिसराची ज्या प्रमाणे डागडुजी केली आहे तशी इथे करण्याची नितांत आवश्यकता आहे. 

मुळात आपल्याला जून्या वास्तुंबाबत अनास्था का आहे? नविन तर आपण तसं बांधूच शकत नाही तर किमान जतन तर केलं पाहिजे. हा संपन्न असा वारसा आहे. पाश्चिमात्य पर्यटक आपल्या देशांत केवळ आपल्या संपन्न इतिहासाचा वारश्याचा अभ्यास करायला येतात. त्यांची अपेक्ष किमान स्वच्छता असावी ही पुरातन स्थळं सुरक्षीत असावीत इतकीच आहे. ती पण आपण पूर्ण करत नसूत तर कुणावर आणि किती टिका करायची? 

मालोजी राजे हा मराठी अस्मितेचा विषय आहे. त्यांच्या नावाने नविन गढी उभारण्याची पुतळा उभा करण्याची आपल्याला मोठी हौस. पण त्यांचीच समाधी मात्र घाणीत सापडलेली. हा नेमका काय विरोधाभास?

समाधी कोणाची यावर तज्ज्ञांनी प्रकाश टाकावा. पण या समाधीची भव्यता, कारागिरी आणि तिचे स्थान भोसले घराण्यातीलच कुणा व्यक्तीची असल्याची ग्वाही देतात हे निश्चित.    

(फोटो सौजन्य : आकाश धुमणे, व्हिन्सेंट पास्किनली)

          श्रीकांत उमरीकर, जनशक्ती वाचक चळवळ, औरंगाबाद 9422878575    






https://shriumrikar.blogspot.com/2021/01/blog-post_18.html

No comments:

Post a Comment

मनसर

 प्रकार : गिरीदुर्ग जिल्हा : नागपुर उंची : १२०० फुट ...