जुन्नरचा परिसराचा इतिहास हा सुमारे २००० वर्ष जुना! हा प्रदेश म्हणजे 'भौगोलिकदृष्ट्या' आणि 'ऐतिहासिकदृष्ट्या' महाराष्ट्राचा शिरेटोप म्हणता येईल. सातवाहन राजांच्या कालापासून हा प्रदेश प्रसिद्ध तर आहेच, पण महाराष्ट्रातील प्रदेश नागरी वस्तीखाली यायला, व्यापारदृष्ट्या येथून सुरुवात झाली असे कळते. तेव्हा हा प्रदेश सातवाहनांची उपराजधानी होती. या परिसरात नाणेघाट व दाऱ्याघाट हे प्राचीन व्यापारी मार्ग, ९ तीर्थक्षेत्रे, भैरवगड, जीवधन, चावंड, हडसर, निमगिरी, ढाकोबा, शिवनेरी, नारायणगड, हरिश्चंद्रगड असे अभेद्य किल्ले, अष्टविनायक गणपती पैकी एक ओझरचा गणपती, लेण्याद्रीच्या बौद्ध लेणी, मानमोडी डोंगरातील जैन गुंफा , ५ धरणे आणि व्याघ्र प्रकल्प आहेत. याजोडीला माळशेज घाट म्हणजे पावसाळ्यात स्वर्ग आहे.
जुन्नर तालुक्यामध्ये नाणेघाटाचे पहारेकरी म्हणून नावलौकिक मिळवलेले किल्ले म्हणजे जीवधन, चावंड, हडसर आणि शिवनेरी . यांपैकी चावंडकिल्ला जुन्नर शहरापासून तासाभराच्या अंतरावर असलेल्या आपटाळे गावानजीक आहे. गडाच्या पायथ्याशी चावंड गाव वसलेले आहे. नाणेघाटापासून जुन्नरच्या दिशेने १५ कि.मी च्या आसपास चावंड वसलेला आहे.चहूबाजूंना सरळसोट कातळकडे असलेला हा बेलाग दुर्ग म्हणजे जुन्नरच्या शिवनेरी, हडसर, चावंड आणि जीवधन या दुर्ग चौकडीतील एक अनोखं रत्न आहे.
चावंड हा चामुंडा नावाचा अपभ्रंश असल्याने व त्यावर पाणयाची सात टाकी एकाच ठिकाणी असल्याने तो सप्त मातृकांशी संबंधित आहे म्हणून तो शाक्त पंथाशी निगडित आहे. चामुंडा हे देवीचे क्रूर रूप , या रुपात सर्व काही भयानक, अमंगल ही देवी बंगाल, बिहार, उत्तर प्रदेश, राजस्थान येथील आहे. हाडकुळी, जीभ बाहेर, उभे केस, मुंडांच्या माळा, हाडांचे दागिने, व्याघ्रचर्म नेसलेली स्मशानात पिंपळाखाली हिचे वास्तव्य. हिचे वाहन गाढव, प्रेत, घुबड, गिधाड ध्वजावर अग्नीपुराणाप्रमाणे चार हात शक्ती, मुंड, शूळ ही हिची आयुधे. या गडाची अनेक नावे अशाप्रकारे आहेत; चामुंड, चाऊंड, चावंड ही नावे चामुंडा
या शब्दाचा अपभ्रंश आहेत चुंड हे निजामशाही आमदानीतील नाव आहे. प्रसन्नगड हे शिवाजी महाराजांनी ठेवलेले नाव.
या प्रदेशाचा सातवाहन राजघराण्याचा असलेला सबंध पहाता कदाचित हा दुर्ग हि सातवाहनांची निर्मिती असावी.मात्र त्याचे थेट कोणतेही पुरावे नाहीत. चावंड निजामशाहीत जाण्याअगोदर तेथील किल्लेदार महादेवकोळी जमातीतला असावा. असे तेथील स्थानिक महादेवकोळी वस्तीवरून प्रतीत होते. येथील अवशेषांना पाहता आणि राजमार्ग अभ्यासता चावंड सातवाहनकालीन असल्याची चिन्हे दिसतात. निजामशाही वारसदाराला येथे ठेवण्यासाठी या किल्ल्याचा वापर केला गेला. यावरून त्याची दुर्गमता दिसून येते. त्याचा इतिहास बखरींच्या पानांत नसला तरी मौखिक लोकसाहित्यात नक्की सापडेल.
इतिहास :-
जे किल्ले ऋषी नावांशी संबंधित आहेत ते अतिप्राचीन.
जे किल्ले बौद्ध, जैन लेण्यांनी अलंकृत आहेत ते प्राचीन.
जे किल्ले शैव, शाक्त, नाथ सांप्रदायाशी निगडित आहेत ते म्हणजे मध्यमयुगीन.
चावंड उर्फ प्रसन्नगडाला सातवाहन, बहामनी, निजामशाही, अदिलशाही, मुघल, मराठे व इंग्रज असा मोठा व प्राचीन इतिहास लाभलेला आहे. नाणेघाटातून येणाऱ्या व्यापारी मार्गाच्या संरक्षणासाठी सातवाहन काळात या गडाची निर्मिती झाली.
अर्थात इतिहासाचा विचार केला तर चावंडचा पहिला उल्लेख येतो तो पंधराव्या शतकात.बहामनी कागदपत्रात चावंडचा उल्लेख जोंदचा किल्ला असा आहे.हा उल्लेख बहामनी इतिहासकार सय्यद तबातबा याने लिहीलेल्या 'बुर्हाणे मासिर' या फारसी भाषेत लिहीलेल्या ग्रंथात आलेला आहे.सन १४८२-८३ मध्ये मलिक नायबचा मुलगा अहमद याने कोकण व दक्षिणेकडील डोंगराळ भागात केलेल्या मोहीमेचा वृत्तांत लिहीताना अहमदचा हि स्वारी करण्याचा काय उद्देश होता? याविषयी तबातबा लिहीतो,'अहमदची इच्छा इस्लामला उच्च पातळीवर नेण्याची, जिहाद पुकारुन महमद पैगंबरानी सांगितलेल्या श्रध्देच्या आणि पवित्र तत्वाचा प्रसार करायचा आणि श्रध्दा आणि नेकी यांचा आभाव असणार्या काफिरांचा बीमोड करणे हा होता.कोकण आणि दक्षिणेकडील डोंगराळ भागात असणारे किल्ले कफिर आणि मुर्तीपुजकांच्या ताब्यात होते.त्यांच्याकडून व्यापारी आणि प्रजाजनांना उपद्रव पोहचत असल्यामुळे सुव्यवस्थेच्या दृष्टीने ते किल्ले शत्रुच्या ताब्यातून सोडवणे आवश्यक होते.म्हणून अहमदने लष्करात बक्षीशी वाटली आणि थोड्याच अवधीत पायदळ आणि घोडदळाची मोठी फौज उभी केली'.
अर्थात सय्यद अलीने अहमदची मोहीम धार्मिक कारणामुळे काढली असे लिहीले असले तरी हा काळ राजकीय अस्थिरतेचा होता.अहमदची हि स्वारी राजकीयदृष्ट्या बस्तान बसविण्यासाठीच होती. इ.स.१४८२ मध्ये महमुद बहामनी ( तिसरा ) याचा मृत्यु झाला. आपल्या मृत्युपत्राद्वारे त्याने मलिक नायबला बहामनी राज्याचा विश्वस्त आणि आपल्या अज्ञान मुलाचा म्हणजे महमुदशहाचा पालक म्हणून नेमले होते.नंतर मलिक नायबने त्याच्या मुलाची म्हणजे अहमदची दौलताबादवरुन जुन्नरला फौजदार म्हणून बदली केली आणि बीड व दौलताबाद प्रांताचे बरेचसे परगणे जुन्नरला जोडले.पण बहामनी राजवटीशी एकनिष्ठ असणार्या बर्याच सरदारांना न जुमानणार्या मराठी सरदारांच्या ताब्यात होते.ते किल्ले म्हणजे चावंड, लोहगड, तुंग, कुवारी, तिकोणा, कोंढाणा, पुरंदर, भोरप, जीवधन, मुरंजन, महोली आणि पाली. हे सर्व किल्ले ताब्यात घेण्याची जबाबदारी मलिक नायबने अहमदवर सोपवली. यातूनच अहमदची कोकण मोहीम उदभवली.
या मोहीमेचे वर्णन सय्यद अली असे करतो 'अहमदने शिवनेरी किल्ला जिंकला आणि त्याने तो मातबर सरदाराच्या हवाली केला.त्यानंतर त्याने शिवनेरीच्या परिसरात असणार्या जोंद किल्ल्यावर हल्ला केला.विशेष प्रतिकार न होताच जोंद किल्ला ताब्यात आला.या किल्ल्यातही भरपूर लूट त्याच्या हाती आली. जुंड किल्ल्याची व्यवस्था आपल्या एका सरदाराच्या हाती सोपवून लोहगडाकडे मोर्चा वळवला.
यानंतर चावंडचा पुढील उल्लेख मुर्तजा निजामशहाच्या कारकीर्दीत ( स.न.१५६५-१५८८) येतो.मुर्तजा निजामशहा हा हुसेन निजामशहाचा मोठा मुलगा.त्याच्या काळात त्याने अलि आदिलशहाच्या उदगीर किल्ल्यावर स्वारी केली आणि तो काबीज केला.त्या किल्ल्याची डागडुजी करुन त्याची व्यवस्था एका विश्वासु अधिकार्यावर सोपवून तो अहमदनगरला परत आला.दरबारात त्याचा मुख्य प्रधान होता खानेखानान मौलाना हसन तब्रिजी.हा विद्वान होता.पण मुर्तजा निजामशहाने नेमणुक केलेल्या शहा हैदर आणि शहा जमालुद्दीन हुसेन इंजु या मोठ्या पदावरच्या अधिकार्यांनी खानेखानानविरुध्द मुर्तजाचे कान भरायला सुरवात केली. त्यामुळे मुर्तजा निजामशहाची खानेखानानवर खप्पा मर्जी झाली आणि त्याची रवानगी जोंद किल्ल्याच्या कैदखान्यात ( म्हणजे चावंडवर ) झाली.
बुर्हाने मासीरचा लेखक सय्यद अली याचे कारण वेगळेच सांगतो.त्याचे कारण म्हणजे मुर्तजा निजामशहाची आई खनुजा हुमांयु हिचा खानेखानान विरोधक होता. वास्तविक खानेखानान हा मुर्तजाशी एकनिष्ठ होता.खनुजा हुमांयुचे निजामशाहीत वाढलेले प्रस्थ त्याला मान्य नव्हते.पण केवळ स्वतःच्या आईशी केलेला विश्वासघाताचे फळ म्हणून मुर्तजाने आपल्याच एकनिष्ठ सरदाराला कैदेत टाकले.
मात्र या घटनेचे वर्णन गुलशने इब्राहिमीचा लेखक फरिश्ता वेगळ्या दृष्टीकोणातून करतो.त्याच्यामते या घटनेला कारणीभुत खानेखानानने इनायततुल्लाचा कपटाने केलेला खुन आणि त्यानेच मुर्तजाला इब्राहिम कुतुबशहाची छावनी लुटून फस्त करण्याचा सल्ला दिला.
कारण काहीही असो, खानेखानानला चावंडवर तुरुंगवास नशीबी आला हेच सत्य !
पुढे मुर्तजा जेव्हा पुन्हा जुन्नर परिसरात आला आणि तो चावंड म्हणजेच जोंड किल्ल्यापाशी आला तेव्हा त्याला आपल्या या वजीराची म्हणजे खानेखानानची आठवण झाली. त्याने केलेला मौलाना इनायतखानाचा छळ आठवला आणि त्याने त्याचा सरदार बिसतखानाला हुकुम दिला कि 'खानेखानानने जसा इनायतखानाचा छळ केला तसाच छळ त्याचाही करण्यात यावा'.
पुढे चंगीजखानाच्या मध्यस्थीने त्याची सुटका करण्यात आली. तिथून खानेखानान निघून बुर्हाणपुरच्या सुलतान रजा अलिखान याच्या पदरी राहिला.
याच मुर्तजाच्या काळात डिसेंबर १५८४ मध्ये त्याचा सरदार सलाबतखानाने वर्हाडातील इमादशाही सैन्यावर मोठा विजय मिळवला.त्यामुळे त्याचे महत्व निजामशाही दरबारात वाढले.पुढे वकीलाच्या हुद्द्यावर स्थिरता लाभल्यावर त्याने पुर्ण निजामशाहीचा कारभार हाती घेउन दरबारातील आधीचा वजीर असदखानाला हुद्द्यावरुन काढून टाकले व त्याची रवानगी जोंडच्या किल्ल्यातील कैदखान्यात म्हणजे चावंडवर केली.
दुसरा बुर्हाण निजामशहा
यानंतर चावंडच्या उल्लेख दुसर्या बुर्हाण निजामशहाच्या कारकिर्दीत ( सन १५९०-१५९४ ) येतो. निजामशहाची रेवदंड्याच्या पोर्तुगीजांविरुध्द युध्दाची तयारी सुरु असताना जोंडच्या किल्लेदाराने त्याला बातमी पाठवली कि 'अमजाद उल मुल्क मेहेदवी याच्या नेतृत्वाखाली तुमच्या विरुध्द बंड करण्याची तयारी सुरु आहे.अमजादने ( अहमदनगरच्या किल्ल्याच्या ) नायकवडींना पैसे चारले आहेत.बादशहांचा मुलगा शहाजादा इस्माईल याला किल्ल्यातून सोडवून आपल्या हवाली करुन सोडवावे.म्हणजे त्याला पुढे करुन बंड करता येईल असा आमजाद्चा डाव आहे'
अर्थात बुर्हाण निजामशहाला याची कुणकुण आधीच लागलेली होती.शिवाय विजापुरचा हेजीब रशीद उल मुल्क यानेही त्याला खबरदार केले होते.मात्र बंडखोर जोपर्यंत पुढचे पाउल उचलत नाहीत तोपर्यंत काही हालचाल करायची नाही असे त्याने ठरवले.आधी त्याने अमजाद उल मुल्कला त्याच्या जहागिरीवर जाउन रहाण्याची आज्ञा केली.यानंतर त्याला बोलावून त्याची चौकशी करुन गुन्हा सिद्ध झाला तर योग्य अधिकार्याच्या हवाली करुन शिक्षा फरमावायची असा बुर्हाण निजामशहाचा विचार होता. पण अचानक काय घडले ते समजत नाही.एके दिवशी दरबारात महालदारखानाने अमजादला ओढत आणले व त्याची आणि त्याच्या साथीदारांची चौकशी करण्यात आली. अमजादचे डोळे काढण्यात आले आणि त्याच्या साथीदारांना हालहाल करुन ठार मारण्यात आले. पुढे अमजादही मरण पावला.मात्र बुर्हाण निजामशहाला सावध करणार्या चावंडच्या त्या किल्लेदाराचे नाव इतिहासाला माहिती नाही.
चांदबीबी
चावंड किल्ल्याचा आणखी एक उल्लेख निजामशाहीतच आहे.हि घटना इ.स.१५९४-९५ दरम्यानची. आदिलशाहच्या सैन्याशी लढताना इब्राहीम निजामशाहच्या मस्तकात गोळी लागून तो ठार झाला. निजामशाही वजीर मिया मंजू जानीबेग याने धन्याशी बेईमानी करुन अहमदनगरचा किल्ला आणि निजामशाहीचा कारभार हातात घेतला. त्याने अहमद नावाच्या मुलाला दौलताबादच्या कैदेतून सोडवून गादीवर बसवले. त्यावेळी त्यांने इब्राहीमचा अल्पवयीन मुलगा बहादूरशहा याला चावंडला बंदिवासात ठेवले. बहादूरशहा (इ.स. १५९४-१५९५) वर्षभर या किल्ल्यावर कैदेत होता. पण याचवेळी नगरच्या किल्ल्यात होती चांदबीबी ही इब्राहीम निजामशाहची बहिण व त्याचा मुलगा बहादूरशाहची आत्या. मिया मंजूने बहादूरशाहवर असलेले चांदबीबीचे पालकत्व हिरावून घेतले. निजामशाहाच्या दरबारातील सिद्दी सरदारांनी तीचा पक्ष उचलून धरला.सिद्दी सरदारांनी मिंया मंजुला असे सुचवले कि बहादुरशहाला गादीवर बसवून चांदबीवीला त्याचे शाही पालकत्व द्यावे.हा बहादुरशहा त्यावेळी फक्त एक वर्षाचा होता.पुढे मिंया मंजुने चांदबीबीला कैद केले व तीला मारायची योजना आखली. हे कारस्थान दरबारातील निजामशाही सरदार इखलासखान व इतर सिद्दी सरदारांना पटले नाही.पुढे निजामशाही गादीवर तोतया आहे हे माहित झाल्यावर बंड केले. इख्लासखानाने तोतया बहादूरशहा निर्माण केला.दि. ५ सप्टेंबर १५९५ रोजी इखलासखान व सिद्दी सरदारांनी अहमदनगरच्या काळ्या चबुतर्यानजीकच्या मैदानावर फौजा जमविल्या.मिंया मंजुने नगरच्या किल्ल्याच्या तटबंदीवर शाही तख्तावर अहमदला बसविले आणि आपल्या मुलाला म्हणजे मिया हसनला ७००० घोडेस्वार देउन इखलासखानावर पाठविले.मात्र लढाईत मिया हसनचा पराभव झाला व तो नगरच्या भुईकोटात पळून गेला. इख्लासखान याने चावंडच्या किल्लेदाराला बहादूरशहा याला आपल्या हवाली करण्यास हुकूम पाठवला पण किल्लेदाराने मिया मंजू याच्या हुकुमाशिवाय हे शक्य नसल्याचे कळवले.इकडे मिया मंजूने अकबराचा राजपुत्र मुराद यास मदतीस बोलावले पण तो तीस हजाराचे मुघल व राजपुत घोडेस्वार घेउन अहमदनगरच्याच किल्ल्यावर चालून आला. त्याआधी मिंया मंजुने इखलासखानाचा पराभव केला होता,बोलावून घेतलेला पाहुणा उलटलेला पाहून आता मिया मंजूला पश्चात्ताप झाला. त्याने अहमदनगरच्या संरक्षणासाठी सरदार अन्सारखान याला व राज्यप्रतिनिधी म्हणून चांदबीबीला नेमले. मिया मंजू आदिलशाह व कुतुबशहाकडे मदत मागण्यास औसामार्गे भागानगरला गेला असता चांदबीबीने त्याचा हस्तक अन्सारखान याचा खून करवला आणि चावंडच्या अटकेतून बहादूरशाहची सुटका करत त्याला सुलतान म्हणून जाहीर केले. तीने शहाजादा मुरादविरुध्द युध्द पुकारले.मोठ्या धैर्याने आणि शौर्याने तीने मोघलांचे आक्रमण परतवून लावले.मुघल सैन्याने माघार घेतल्यावर तीन दिवसांनी मिंया मंजु अहमदला घेउन नगरच्या किल्ल्याजवळ येउन पोहचला.त्याला वाटले आता तरी दरबारी सरदार अहमदला स्विकारतील.पण झाले उलटेच.किल्ल्यातील लोकांनी त्याला स्विकारले तर नाहीच उलट किल्ल्याच्या आतही येउ दिले नाही.नेहंगखानाने किल्ल्याचा दरवाजा बंद करुन घेतला.
निजामशाहीच्या या संघर्षात चावंड किल्ल्याचा तुरुंग म्हणूनच वापर झालेला दिसतो. पेशवाईमध्ये मराठ्यांचे साम्राज्य अटक ते कटक असे पसरले असल्यामुळे किल्ल्यांचे महत्व उणावले अस्ल्यामुळे बहुतेक गडांचा कारागृह म्हणून वापर केला गेला.अगदी राजधानी रायगडाचा देखील तुरुंग म्हणून वापर केलेला दिसतो.अर्थात त्याआधी काही गडांचा कारागृह म्हणून वापर झालेला दिसतो.उदा. शिवकाळात सोनगड्,वासोटा यांचादेखील तुरुंग म्हणून वापर झालेला आहे.
अर्थात निजामशाही कालातील मुलकी व सामाजिक इतिहास सांगणारी कागदपत्रे फारशी मिळत नाहीत.त्यामुळे या काळात चावंडसारख्या किल्ल्यांवर फक्त राजकीय कैदी ठेवत कि इतर आरोपीही कैदेत असत हे आज समजत नाही.

शहाजी महाराज
यानंतर चावंडचा उल्लेख मिळतो तो निजामशाहीच्या अस्ताला.शहाजी राजांनी इ.स.१६३३ ते १६३६ या कालावधीत जीवाचे रान करुन निजामशाही वाचवण्याचा आटोकाट प्रयत्न केला.पण त्यात त्यांना यश आले नाही.१६३६ मध्ये निजामशाहीचा आदिलशाह आणि मोगलांपासून बचाव करण्यासाठी शहाजीराजांनी माहुलीगडाच्या पायथ्याशी शरणागती पत्करुन केलेल्या तहानुसार लहानग्या मुर्तीजा निजामशहाला मुघलांच्या ताब्यात द्यावे लागले.त्याचबरोबर त्यांनी आपली काही विश्वासु माणसे व किल्ल्याचा ताबा देण्याविषयक पत्रे अबु सईद याच्याबरोबर देउन त्याला मुघल सरदार खान जमानकडे पाठवावे लागले.त्यावेळी मोघलांच्या हवाली करण्यात जे गड होते त्यात चावंड मोगलांना मिळाला.
शिवकाळात चावंड किल्ल्याबद्दलचा उल्लेख पर्णालपर्वतग्रहणाख्यानम् या संस्कृत काव्यग्रंथात मिळतो. या काव्यग्रंथाचा कर्ता कवी जयराम पिंडे तंजावरच्या व्यंकोजीराजे भोसले यांना शिवाजी महाराजांनी मुघल आणि आदिलशाहीचे कोणकोणते किल्ले कसे जिंकले यांचे वर्णन करताना ग्रंथाच्या पहिल्या अध्यायातील ३७ व्या श्लोकात चावंडचा उल्लेख करतो.
तथैव चामुण्डगिरी हरिश्चंद्रस्तथैव च।
महिषोष्यड्सरस्तावद गृहीतावतिसंगरात्।। ३७।।
याचा अर्थ असा कि त्याचप्रमाणे चामुण्डगिरी (चावंड), हरिश्चंद्रगड, महिषगड (?) आणि हडसर हे (किल्ले) सुद्धा (शिवाजी महाराजांनी) निकराने लढून घेतले.परंतु या श्लोकाला दुजोरा देईल असा समकालीन अन्य पुरावा मिळालेला नाही.कदाचित मे १६७२-७३ मध्ये शिवाजी महाराजांनी साल्हेर्,अहिवंत्,रवळ्या-जवळ्या,मार्किंडागड,अचला हे गड जिंकुण घेतले होते.त्याच सुमारास हडसर-जीवधन आणि चावंड उर्फ चामुंडगड जिंकला असावा.तेव्हा त्याचे नाव प्रसन्नगड ठेवले असावे. अर्थात यासाठी देखील सबळ पुरावा नाही.पण शिवकाळातच चावंडचा प्रसन्नगड झाला.पण शिवकाळात राजाभिषेकाच्या आदल्या वर्षी म्हणजे मे १६७३ च्या सुमारास ब्रिटीश डॉक्टर फ्रायरने जुन्नर परिसराला व शिवनेरीगडाला भेट दिली. त्याचे तो आपल्या पुस्तकात वर्णन करतो.त्यात शिवनेरीवरची फौज शिवाजी महाराजांच्या सैन्याशी मुकाबला करण्यासाठी खाली उतरली असे लिहीले आहे.याचा अर्थ यावेळी शिवाजी महाराजांचे सैन्य जुन्नर भागातील चावंड्,हडसर्,जीवधन जिंकून घेण्यासाठी या परिसरात आले असणार.
संभाजी महाराजांच्या काळात चावंड मराठ्यांच्या ताब्यात होता कि नाही हे आपल्याला पुराव्या अभावी समजत नाही, परंतु इ.स.१६९४ मध्ये औरंगजेब स्वराज्य जिंकण्यासाठी दक्षिणेत आला असता छत्रपती राजारामाच्या काळात त्याच्या फौजेने हा किल्ला जिंकला व सुरतसिंग गौंड याला किल्लेदार म्हणून नेमले पण तो तिथे येऊन पोहचण्यापुर्वीच मराठ्यांनी किल्ला परत जिंकून घेतला.
त्याच्या नोंदी आपल्याला मुघल दरबाराच्या अखबारात वाचायला मिळतात.त्या अशा:
१) ता.१६ डिसेंबर १६९४: मनोहरदास गौड ( हा शिवकाळात माहुलीचा किल्लेदार होता ) याचा नातु सुरतसिंग गौड याला चौंडची किल्लेदारी देण्यात येउन त्याची मनसब वाढविण्यात आली.त्याला ४०० जात व २०० स्वार अशी मनसब होती.ती १०० स्वारांनी वाढविण्यात आली.
२) ता.८ जानेवारी १६९५ : गजिउद्दीन बहादुर याने हा किल्ला काबीज केला. त्याच्या सोन्याच्या किल्ल्या व गाजिउद्दीनचा विनंतीअर्ज बादशाहाच्या नजरेखालून गेला.
३) ता.१५ जुलै १६९५: जुन्नरचा किल्लेदार व फौजदार मन्सुरखान याने अर्ज केला होता कि, 'मी या भागाची उत्तम प्रकारे व्यवस्था पहात आहे.मला जौदगडची ( म्हणजे चावंडची ) पण किल्लेदारी मिळावी.
अर्थात बादशहाने ते मान्य केले नाही.गाजीउद्दीन बहादुर फिरोजजंग याला लिहून दुसर्या कोणाची तरी नेमणूक करावी अशी बादशहाने आज्ञा केली.या नोंदीवरुन मराठ्यांनी अल्पकाळ का होईना चावंड जिंकुण घेतला होता हे स्पष्ट होते.
यानंतर महाराणी ताराबाईच्या कारकीर्दीत चावंडच्या किल्लेदाराच्या नेमणुकीबद्दल एक नोंद अखबारात मिळते, ती अशी
ता २१ सप्टेंबर १७०४ जौदचा किल्लेदार आणि माधवसिंह कछवाचा मुलगा शामराव याची मनसब जुन्नरचा किल्लेदार व फौजदार अजीजखान याच्या शिफारसीवरुन वाढवण्यात आली,यावेळी औरंगजेबाचा मुक्काम माकरी ( पागरी ) येथे होता.या नोंदीत चावंडच्या किल्लेदाराचे नाव आले आहे.तेव्हा २१ सप्टेंबर १७०४ पर्यंत तरी तो किल्ला मुघलांकडेच होता हे नक्की.
पुढे पेशवेकाळात किल्ला मराठयांच्या ताब्यात आला. १० ऑगस्ट १७४९ रोजी चावंड किल्ल्याचा हवालदार संताजी मोहिते यांच्या सनदेत किल्ला मुघलांकडून घेतल्याचा उल्लेख आहे आणि सुटलेल्या जिनसाची मोठी यादी जोडलेली आहे.यात भांडी,घरगुतीवस्तू,हत्यारे,पाळीव प्राणी यांची नोंद आहे.
इ.स.१७७६ मध्ये देशमुख/नाईक संताजी शेळकंदे यांच्या नेतृत्वाखाली महादेव कोळी लोकांनी पेशावांकडून किल्ला ताब्यात घेतला अशी नोंद आहे.
इ.स.१७८५-८६ मध्ये माधवराव पेशवे यांच्या कारकीर्दीत पेशव्यांचा कैदखाना या गडावरच असल्याचा उल्लेख येतो. याचा उल्लेख असा येतो 'माधवराव कृष्ण भिंगारकर हे किल्ले चावंड, तालुके शिवनेर येथे अटकेत आहेत.त्यांस मशारनिल्हे वृध्द व अशक्त सबब त्यांची स्त्री त्यांच्याजवळ राहणार.त्यास किल्ले मजकुरी मशारनिल्हेजवळ ( माधवकृष्ण जवळ ) ठेवून पोटास ( शिधा ) शेर शिरस्ताप्रमाणे ( म्हणजे नियमानुसार ) देत जाणे म्हणून बाळाजी महादेव यांचे नावे सनद.
इ.स. १८१८ च्या शेवटच्या इंग्रज-मराठे युध्दात चावंडचा किल्ला इंग्रजांनी कसा जिंकून घेतला याबध्दल "Pendhari and Maratha war papers" page no. 294 मध्ये हकीकत आली आहे.
A British brigade was send to take Chavand.The brigrade encamped before Chavand on 1st May and demanded its surrender. The commandant refuses to surrender unless directed by his master.A fire of Mortar and Howitzer was began in the evening and bombardment continue till next morning during which about hundred shells were fired.Then the garrison of upwards of 150 Maratha surrendered unconditionally. They were disarmed and dismissed to their village.
वरील हकीकतीचे भाषांतर खालील प्रमाणे :
२५ एप्रिल १८१८ मध्ये इंग्रजांनी जुन्नर ताब्यात घेऊन सैन्याची एक तुकडी चावंडला पाठवली. दि १ मे १८१८ रोजी ती तुकडी चावंड किल्ल्याजवळ येउन पोहचली.त्यांनी चावंडच्या किल्लेदाराला किल्ला इंग्रजांच्या स्वाधीन करण्याचा आदेश दिला पण किल्लेदार बुधाजी भालचीम यांनी नकार दिला. धन्याच्या आदेशाशिवाय किल्ला सोडणार नाही असा उलट निरोप किल्लेदाराने पाठविला. इंग्रजांनी मॉर्टर व हॅवित्झर तोफांनी किल्ल्यावर मारा करायला सुरवात केली. तो मारा दुसर्या दिवशी सकाळपर्यंत सुरुच होता. इंग्रजांनी किल्ल्यावर १०० तोफगोळ्यांचा भडीमार केल्याने किल्लेदाराला शरण जाणे भाग पडले. इंग्रजांनी त्यांना निशस्त्र केले आणि त्यांना त्यांच्या गावाकडे जाउ दिले.मात्र या लढाईचे सविस्तर वर्णन जसे इंग्रजांची तुकडी कोणाच्या नेतृत्वाखाली आली होती,त्यांनी किल्ल्यावर कोणत्या बाजुने मारा केला ,इंग्रजांच्या हल्ल्यात मराठ्यांची किती हानी झाली,त्यांना किल्ल्यात काय बघायला मिळाले अश्या प्रश्नांची उत्तरे मिळत नाहीत. इंग्रजांनी किल्ला आपल्या ताब्यात घेतल्यावर किल्ल्याच्या वाटेवर सुरुंग लावून पायऱ्यांची तोडफोड केली.
जायचे कसे?
पुण्यापासून : पुणे ते जुन्नर एस.टी. बस किंवा स्चतःच्या वाहनाने जाता येईल. बसने प्रवास करायचा तर जवळपास अडीच तास लागतात. शिवाजीनगर पासून दर अर्ध्या तासाला बस असते. पुण्यातून पुणे-नाशिक महामार्गावरुन पुणे-चाकण-राजगुरुनगर-नारायणगाव-जुन्नर असे जाता येते.
मुंबईवरुन जुन्नरला जाण्यासाठी दोन पर्याय आहेत.
१) मुंबई - कल्याण - माळशेज घाट मार्गे - जुन्नर असा रस्ता असून हे अंतर ११३ कि.मी.आहे.या मार्गे अडीच तास लागतात.
२) मुंबई -लोणावळा-चाकण-नारायणगाव-मंचर हे अंतर २०० कि.मी.असून यामार्गे चार ते पाच तास लागतात..
नवीन जुन्नर बस स्थानकापासून १६ किमी अंतरावर असलेल्या ह्या गडाच्या पायथ्याशी चावंड गाव वसलेले आहे. जुन्नर स्थानकापासून अंजानावळ वा घाटघर बस पकडून चावंड फाट्यावर उतरावे. जुन्नर स्थानकावरून बस व्यवस्था आहे पण वारंवारता कमी आहे.चावंड फाट्यापासून १५ मिनिटे चालत गेल्यावर चावंड गाव लागते. त्याच्या अलीकडेच किल्ल्याच्या पायऱ्या चालू होतात. चावंड गावात आणि आजुबाजूच्या गावांमध्ये महादेवकोळ्यांची वस्ती आहे.
बसच्या वेळा :
चावंड, कुकडेश्वर, नाणेघाट जाण्यासाठी :
१. जुन्नर ते घाटघर/अंजनावळ : सकाळी १०, दुपारी- १२:३०, २, ५, ७:३० (शेवटची गाडी मुक्कामी अंजनावळ)
२. जुन्नर ते कुकडेश्वर : सकाळी ११, दुपारी ३:३०
नाणेघाट ते जुन्नर जाण्यासाठी :
१. अंजनावळ (घाटघर फाटा) ते जुन्नर सकाळी -११, दुपारी -३:३०, ५:३०
सध्या गडाला जाण्या करीत नवीन पायऱ्या बांधलेल्या आहेत. इथून १५ मिनिटे चढून गेल्यास आपण जुन्या पायऱ्या पर्यंत पोहचतो.जुन्या पायऱ्या खूपच रुंद असल्याने तिथे संरक्षक कठडे बसविले आहेत. इथून चढताना काळजी घेणे आवश्यक आहे.
जसे आपण थोडे वर वर जाऊ लागतो तसे चावंड गाव आणि माणिकडोह धरणाचे विहंगम दृश्य दिसू लागते. या धरणामुळे येथे पीक पाणी चांगले असून हा प्रदेश बऱ्यापैकी सधन आहे. या वाटेने साधारण ३०० पायऱ्या चढून गेल्यावर साधारण अर्धातास चढल्यानंतर आपल्याला खडकात खोदलेल्या अरुंद लहान पायऱ्या लागतात.
एकेकाळी या वीतभर पायर्या चढायचे म्हणजे कोण दिव्य होते.मात्र आता इथे रेलिंग लावून सर्वसामान्य दुर्गभटक्यांना जाणे सोयीचे केले आहे.सध्या जुन्या रेलिंग काढून येथे नवीन रेलिंग लावलेल्या आहेत. चक्क पर्यटन खात्यातील पैसे या कामासाठी वापरलेले आहेत ( म्हणजे त्यांनी मिळवले आहेत) असे सरपंचांकडून कळले.एकावेळी एकच माणूस जाऊ शकेल अश्या या पायऱ्या कातळात खोदल्या आहेत. आता नवीन रेलिंग असल्याने त्या पूर्ण सुरक्षित आहेत. लावलेल्या रोपची हि गरज पडत नाही. खरेतर सराईत दुर्गभटक्यांना या रेलिंगची गरज नाही,पण नवे भिडु असतील तर या रेलिंगचा आधार घेतलेला चांगला. अंदाजे ८० अंशातला हा उभा कडा खोदून त्यात पायर्या घडवल्या आहेत. चावंडच्या कड्यांकडे पहाताना एका कवितेतलं कडवं आठवते.
"तासिले कडे अभेद्य,
घडविले दुर्ग बेलाग...
सळसळती मनगटे मराठी,
अन् समशेर ओकते आग ..."
या पायर्या अश्या धोकादायक होण्याचे कारण अर्थात इंग्रज ! इंग्रजांनी १ मे १८१८ रोजी चावंडवर हल्ला करून येथील पायऱ्या उद्ध्वस्त केल्या. त्यासाठी जागोजाग सुरुंग लावल्याच्या खुणा आजही आपल्याला पायऱ्या चढताना दिसतात.
साधारण १५ पायऱ्या चढून गेल्यावर कोणा दुर्गप्रेमीने एका खोबणीत आधारासाठी पुरलेली निकामी तोफ दिसते. पुर्वी या तोफेला दोर बांधून लोक वरखाली ये-जा करत असत. साधारण अर्धा फुट व्यास असलेली ही तोफ ३.५ फूट लांब असुन तिचा जमिनीवरील भाग साधारण दीड फुट आहे. चावंडच्या या पायर्या एक वेगळंच थ्रिल देऊन जातात.
आता या तोफेची स्थापना एका गाड्यावर केली आहे.
दरवाज्याला हल्लीचे हे आधार लावलेले आहेत.
गडाचा दरवाजा तटबंदीत पायऱ्यांच्या काटकोनात बांधलेला असुन वाटेच्या उजव्या बाजुस दरवाजाच्या रक्षणासाठी बुरूज बांधलेला आहे. त्यामुळे खालून वा पायऱ्या चढून वर आलो तरी गडाचा दरवाजा दिसत नाही. गडाचा दरवाजा दक्षिणाभिमुख असुन कमकुवत झालेल्या या दरवाजाला लोखंडी खांबांचा आधार देण्यात आला आहे.
दरवाजाची उजवी बाजू म्हणजे एक अखंड तासलेला कातळ असुन त्यावर एक तसेच दरवाजाच्या दगडी कमानीवर एक असे दोन गणपती कोरलेले आहेत. यावरून असे कळते की पेशवे काळातही या गडावर बराच राबता असावा.
दरवाजाच्या वरील बाजुस मारगीरीसाठी असलेल्या जंग्या तसेच दरवाजा समोरील भागात लक्ष ठेवण्यासाठी झरोका दिसुन येतो.
दरवाज्यावरील गणेशला वंदन करून किल्ल्यात प्रवेश केला असता काही पायऱ्या लागतात. या पायऱ्या चढुन आपला गडमाथ्यावर प्रवेश होतो.गडावर जाण्यास पायथया पासून १.३० तास लागतो.
किल्ल्याच्या प्रवेशव्दारातून दहा पायर्या चढून गेल्यावर दोन वाटा लागतात. वरची उजवीकडची वाट उद्ध्वस्त अवशेषांकडे घेऊन जाते, तर डावीकडे तटबंदीच्या बाजूने जाणारी वाट आहे. चावंड किल्ला समुद्र सपाटीपासून ३५०० फूट उंचावर असुन ८५ एकर परिसरावर दक्षिणोत्तर पसरला आहे. किल्ल्यावर आजही सहा बुरुज शिल्लक असून किल्ल्याची तटबंदी बांधताना कातळात चर खोदून त्यावर तटबंदी बांधली आहे.