Lingodbhava Shiva-लिंगोद्भव शिव - तामिळनाडू, शिल्पयात्रा

Lingodbhava Shiva – Brahma and Vishnu decided to take up the challenge to find ends of the pillar and prove their supremacy. Brahma takes up the form of a Swan or Gander and flies to the topside to look for the upper end while Vishnu takes the form of a boar and dives deep down to search for the bottom. But none of them succeeds in finding the end. Brahma decides to lie about finding the end, whereas Vishnu concedes.
Enraged, Shiva appeared out of the fiery column and cursed Brahma so that he would not be worshipped in temples on earth.
शिवरात्र व लिंगोद्भव शिव यांचा परस्परसंबंध

एक लिंगरूपी तेजोस्तंभातून शिवाचे प्रकटीकरण ही शिवकथा आपल्याला दक्षिणेकडील काही मंदिरात पाहायला मिळते. कुंभकोणम येथील ऐरावतेश्वर मंदिराच्या मागील भागात याचे एक उत्कृष्ट शिल्प आहे. या शिल्पसंकल्पनेचा उगम आपल्याला थिरुक्कुरल या प्राचीन तामिळ ग्रंथात आढळतो. अशाच प्रकारचं पण काहीसे वेगळे शिल्प आम्हाला कांचीपुरम येथील कैलासनाथार मंदिरात देखील आढळले. कांचीपुरमच्या एकांबरेश्वर मंदिरात देखील विष्णुमंदिराच्या पाठच्या भिंतीवर लिंगोद्भव शिवाचे सुंदर शिल्प आहे. महाराष्ट्रातील मुंबईजवळच्या अंबरनाथ येथील आम्रनाथ शिवमंदिरामध्ये देखील हे शिल्प आपल्याला जीर्णावस्थेत आढळून येते.
लिंगोद्भव शिवाची कथा
कल्पाच्या अंती महाप्रलयाच्या वेळी विष्णू आपल्या योगनिद्रेमध्ये होते. तेव्हा त्यांच्यासमोर ब्रह्मदेव प्रकट झाले. ब्रह्माने विश्वाचा निर्माता म्हणून विष्णूला स्वतःची ओळख करून दिली, ज्या वर विष्णूने सांगितले की तो विश्वाचा शिल्पकार आहे. यावरून एकमेकांवरील श्रेष्ठत्वाबद्दल दोघांमध्ये वाद सुरू झाला.
तेव्हा शिवशंकर लिंगरूपातील तेजोस्तंभासारखे प्रकट झाले व त्यांनी या दोघांनीही आपला ठाव शोधण्यास सांगितले. त्यावेळी या लिंगाचा ठाव शोधण्याकरिता ब्रह्मदेवांनी हंस रूपाने वरच्या बाजूला, तर विष्णूंनी वराहरुपाने याच्या खालच्या बाजूस प्रयाण केले. पण बऱ्याच शोधाअंती देखील त्यांना याचा अंत काही सापडला नाही. यावेळी ब्रह्मदेवांनी मात्र त्या तेजोस्तंभाचा वरचा भाग शोधला आहे असे सांगायचे ठरविले.

ब्रह्मदेव
हंसाच्या रूपात वरच्या दिशेने उडत असताना त्यांना केतकीच्या फुलाच्या
पाकळ्या खाली पडताना दिसल्या होत्या. गूढ तेजोस्तंभाच्या शिखरावर पोहोचून
त्याचा अंत शोधण्याच्या आपल्या प्रयत्नांना कंटाळलेल्या, ब्रह्माने, त्या
केतकीच्या फुलाला, आपल्या असत्यकथनात सहभागी होण्याची विनंती केली. ते
केतकीचे फुल तेथूनच आले आहे असे त्याने सांगावे, असे ठरले. ब्रह्मदेवांनी
तेजोस्तंभरूपी शिव आणि विष्णूची भेट घेतली आणि त्याने या विश्वस्तंभाचे मूळ
शोधले असल्याचे ठामपणे सांगितले. यासाठी त्यांनी त्या केतकीच्या फुलाची
साक्ष देखील काढली. क्रोधित शिव अग्निमय स्तंभातून प्रकट झाला आणि त्याने
ब्रह्मदेवांना शाप दिला की पृथ्वीवरील मंदिरांमध्ये त्याची पूजा केली जाणार
नाही. ब्रह्मदेवाची मंदिरे पृथीवर न आढळण्याची ही कथा. त्याचबरोबर
शंकराच्या शापामुळेच केतकीचे फुल देखील पूजेसाठी का वापरले जात नाही,
याचीही संगती आपल्याला या कथेमुळे लागते. शिवाच्या प्रकटीकरणाचा हा काळ
म्हणजेच लिंगोद्भव काळ हा शिवरात्र म्हणून साजरा केला जातो, अशा प्रकारचे
वर्णन आपल्याला काही ठिकाणी पाहायला मिळते.
यावेळी असत्यकथनाबद्दल क्रुद्ध होत शंकराने भैरवाची निर्मिती केली. या
भैरवाने ब्रम्हाचे ५ वे शीर कापून टाकले. आपले भवितव्य समोर दिसताच
ब्रह्मदेवाने शंकरांची माफी मागितली आणि शंकरानी त्याला क्षमा केली.
म्हणूनच ब्रम्हाची काही मंदिरे असली तरी त्याची विशेष पूजा होत नाही.
भैरवाची मूर्ती दाखविताना कधी कधी त्याच्या हातात ब्रम्हाचे हे शीर देखील
दाखवले जाते. आणि ही सर्व घटना तामिळनाडूतील अरुणाचलेश्वर मंदिर परिसरात
घडली असे मानले जाते. म्हणूनच हे मंदिर पंचमहाभूतांपैकी अग्नी तत्वाचे
निदर्शक मानले. जाते. या घटनेचे वर्णन आपल्याला अरुणाचल पुराण या
स्थलमाहात्म्य पुराणात आढळून येते.

या शिल्पामध्ये आपल्याला बरेचदा डावीकडे ब्रह्मदेव तर उजवीकडे श्रीविष्णू पाहायला मिळतात व लिंगातून प्रकटलेल्या शिवपिंडीवर आपल्याला हंसरुपातील ब्रह्मदेव आणि खालच्या बाजूला वराहरुपातील श्रीविष्णू दिसून येतात.
Ranganathaswamy Temple Srirangam-श्रीरंगमचा रंगनाथस्वामी

Interesting Story of Largest Temple of India – The Ranganathaswamy Temple Srirangam
India’s
Largest Temple and World’s Largest Hindu Temple in Worship. The
Ranganathaswamy Temple spans an area of 156 acres in Srirangam, north of
the city of Tiruchirappalli in the State of Tamilnadu. The Temple
consists of 7 concentric rectangular Enclosures with the enclosing walls
(Prakaras) having Gopuras at the centre of each wall. The Main entrance
is from the South Side which is explained by a Local Legend, which
takes us back to Ramayana period and has been attributed to Ravana’s
brother Bibhishana, whose image is seen on a column depicting the story.

Out of 7 enclosures, the outer 3 enclosures are fully populated and are inhabited by various residents and shopkeepers like a village. The outermost enclosure has a Gopura of 236 feet, which is the Highest Gopura in the world and hence called Rajagopuram. The Story related to this Gopuram & the Temple is narrated here in MARATHI (मराठी)
भारतातील सर्वात मोठ्या पूजित मंदिराची अजब कहाणी
रंगनाथस्वामी मंदिर हे तमिळनाडूच्या त्रिचनापल्ली येथील विष्णुमंदिर. सुमारे १५६ एकर चा विस्तार असलेले हे प्रचंड मंदिर भारतातील नव्हे तर जगातले, पूजेत असलेले, सर्वात मोठे मंदिर आहे(अंगकोर वाट यापेक्षा मोठे आहे पण हिंदू पुजेचे मंदिर नाही). या मंदिराच्या गाभाऱ्यात केवळ हिंदूंनाच प्रवेश दिला जातो. सर्वसाधारणपणे मंदिरे पूर्व , पश्चिम अथवा उत्तर मुखी असतात पण हा रंगनाथ स्वामी मात्र दक्षिणेकडे पहात शेषावर पहुडला आहे आणि त्याची एक सुंदर कहाणी आहे.
मंदिराची दंतकथा
रावणवधानंतर
श्रीराम अयोध्येला परतले. रामाच्या राज्याभिषेकाला हनुमंतासहित बिभीषण
देखील उपस्थित होता. श्रीरामाचा वियोग आता आपल्याला होईल या विचाराने तो
अस्वस्थ झाला. तेव्हा श्रीरामांनी त्याला आपल्या ईश्वाकू वंशातील श्री
रंगनाथ स्वामींची मूर्ती दिली व ती माझा वियोग तुला जाणवू देणार नाही असेही
सांगितले, पण अट एकच, नेताना ही मूर्ती कुठेही खाली ठेवायची नाही (गोकर्ण
महाबळेश्वर कथेतील रावणाला शंकराने घातलेली अट). इथेही देवांना पुन्हा
काळजी पडली, रंगनाथ स्वामी लंकेत पोहोचले की लंकेची भरभराट होईल. स्वर्गाचे
महत्त्व कमी होईल. बिभीषणाचे ठीक आहे , पण त्याच्यानंतरचा राजा कोण असेल ?
कसा असेल ? त्यामुळे हे थांबवायला हवे. पुन्हा ही कामगिरी गणपतीकडे
सोपविण्यात आली. यावेळी बिभीषण संध्या करण्यासाठी त्रिचनापल्लीला थांबला.
गुराखी गणपतीला रंगनाथाची मूर्ती सांभाळायला दिली. गणपती म्हणाला, माझ्या
मालकाने बोलावल्यावर मी तुला ३ हाका मारेन. आलास तर ठीक नाहीतर मूर्ती
तिथेच ठेऊन मी परत जाईन. बिभीषण संध्या करायला उतरला व इकडे गणपतीने ३ वेळा
त्याला ऐकू जाणार नाही अशा आवाजात हाका दिल्या, आणि रंगनाथाला तिथेच ठेऊन
निघून गेला.
बिभीषण परतला आणि पहातो तर रंगनाथ स्वामी जमिनीवर व गुराखी गायब. त्याने देवाला विनंती केली, पण देवाने सांगितले की मी इथेच थांबून तुझ्या राज्यावर नजर ठेवेन आणि म्हणून इथला रंगनाथ स्वामी दक्षिणमुखी आहे. या कहाणीशी संबंधित विमानातून रंगनाथ स्वामीला लंकेला नेणारा बिभीषण येथील खांबावर कोरलेला आपल्याला पाहायला मिळतो.
कदाचित याच कारणास्तव (रंगनाथ स्वामीचे श्रीलंकेवर लक्ष रहावे म्हणून ) दक्षिण दरवाजा कमी उंचीचा म्हणजे गोपुर नसणारा होता. पण १९७० च्या सुमारास मंदिर व्यवस्थापनाने तो मुख्य दरवाजा असल्याने वाढविण्याचा व त्यावर उंच गोपूर बांधण्याचा निर्णय घेतला व १९८७ साली हे गोपुर पूर्ण झाले.
याबरोबरचा योगायोगाचा भाग असा की हे गोपूर पूर्ण झाले आणि रंगनाथाची लंकेवरची कृपादृष्टी हटली व दुर्दैवाचे दशावतार सुरु झाले. दहशतवाद फोफावला, आर्थिक अरिष्टाच्या सावटाखाली देश आला. हे टाळण्यासाठी माजी राष्ट्राध्यक्ष चंद्रिका कुमारतुंगा यांनी रंगनाथस्वामीचे मंदिर श्रीलंकेतच निर्माण करायचे ठरविले होते पण त्यानाही सत्तेपासून पायउतार व्हावे लागले, आणि त्यांचे स्वप्नही अधुरेच राहिले.
अशा या भव्य मंदिरामध्ये मोठ्ठा गरुडमंडप आहे ज्यावरील खांबांवर अनेक शिल्पकृती कोरलेल्या आहेत. मंदिर परिसरात अनेक छोटी मंदिरे आहेत यातही कृष्ण अर्जुन, राम-लक्ष्मण-सीता-हनुमंत ही मंदिरे पाहण्यासारखी आहेत. या गरुड मंडपाच्या बरोबर समोर शेषशायी विष्णुंची मोठी मूर्ती असलेले मुख्य मंदिर आहे. काळ्या रंगाची ही पहुडलेली मूर्ती, गाभाऱ्यात असलेल्या अपुऱ्या प्रकाशामुळे, नीट निरखून पहावी लागते.
दुसऱ्या आख्यायिकेनुसार, सनक म्हणजेच चार बाल ऋषी, श्रीरंगममध्ये रंगनाथाच्या दर्शनासाठी आले. त्यावेळी रंगनाथाची विश्रांतीची वेळ असल्याने, त्यांना वैकुंठाच्या जय आणि विजय या द्वारपालकांनी रोखले. अनेकदा विनंती करूनही त्यांना प्रवेश नाकारण्यात आला. रागाच्या भरात चौघेही द्वारपालकांना शाप देत निघून गेले. द्वारपालकांनी विष्णूजवळ जाऊन त्याला शापाबद्दल सांगितले. रंगनाथाने सांगितले की तो शाप परत करू शकणार नाही आणि त्यांना दोन पर्याय दिले. (१) तीन जन्मांत विष्णूचा विरोध करणारे राक्षस म्हणून जन्म घ्या किंवा (२) पुढील सात जन्मांत चांगला मनुष्यजन्म घ्या. परमेश्वरासोबत परत येण्यास उत्सुक असलेल्या द्वार पालक जय विजयानी असुर योनीत जन्म घेणे आणि असे मानले जाते की त्यांनी पहिल्या जन्मात हिरण्याक्ष आणि हिरण्यकशिपू म्हणून जन्म घेतला ; दुसऱ्या वेळी रावण आणि कुंभकर्ण म्हणून ; तर तिसऱ्या वेळी शिशुपाल आणि दंतवक्र. विष्णूने प्रत्येक जन्मात या राक्षसांना मारण्यासाठी अनुक्रमे वराह, नरसिंह, राम आणि कृष्ण असे चार अवतार धारण केले. पण प्रत्येक जन्मात त्यांच्या दुष्टपणाची तीव्रता कमी होत गेली म्हणून हिरण्याक्ष व हिरण्यकश्यपूला मारण्याकरिता विष्णूला दोन पूर्ण अवतार लागले तर रावण आणि कुंभकर्णाना त्याने केवळ एकाच म्हणजे रामावतारात संपविले आणि शिशुपाल व दंतवक्र तर त्याच्या अवताराच्या विरोधातील मुख्य पात्रेही नव्हती.
रंगनाथस्वामी मंदिराचा विस्तार

१५५ एकरच्या प्रचंड विस्तारात सामावलेले हे ७ कोट असलेले प्रचंड विस्तीर्ण मंदिर आहे. या सातव्या कोटाचेच गोपुर जगातील सर्वात उंच गोपुर असून २३६ फूट उंचीचे हे गोपुर २५ मार्च १९८७ मध्ये पूर्ण केले गेले, आणि आता राजागोपुरम म्हणून ओळखले जाते. ६ व्या कोटाची गोपुरे होयसळ (१३ वे शतक) व पांड्य (१४ वे शतक) यांच्या कालावधीत बांधली गेली असावीत असे त्यांच्या शैलीवरून वाटते. तर ५ व्या कोटाच्या गोपुरांवर चोला राजांचा प्रभाव जाणवतो.
याच्या बाहेरील ३ कोटांमध्ये तर आता गाव वसलेले असून इतर ४ कोट मंदिरासाठी राखून ठेवण्यात आलेले आहे.
रंगनाथस्वामी मंदिराच्या इतिहासाचा आढावा
भारताच्या धार्मिक इतिहासात या वैष्णव मंदिराला अनन्यसाधारण स्थान आहे. याच्या निर्मितीचा निश्चित कालावधी सांगता येणे कठीण असले तरी ७ व्या शतकापासून ते दहाव्या शतकात चोला राजांच्या कालखंडात याच्या अस्तित्वाचे साहित्यिक पुरावे सापडतात. यानंतर ११ व्य शतकातील चोला राजांनी दिलेली दानपत्रे देखील आहेत. हिंदू धर्माचा विशिष्ट अद्वैत सिद्धांत मांडणाऱ्या रामानुजाचार्यांचा उदय याच सुमारासचा . त्यांनी याच मंदिराला आपले स्थान बनवले होते जे आजही त्यांच्या स्मृतिवशेषांच्या स्वरूपात जपले जाते. मंदिराच्या दक्षिण द्वाराने ४ थ्या कोटात (म्हणजे सध्या मंदिराच्या सर्वात बाहेरच्या) शिरल्यावर उजव्या हाताला (पूर्वेकडे) रामानुजचार्यांची समाधी आहे. येथे त्यांचे बैठे शव गेली ९०० वर्षे जतन करुन ठेवले आहे.हा रामानुजाचार्यांचा देह असल्याचे सांगितले जाते. (आम्ही पाहिल्यावर आंम्हाला तो देह इतक्या सुस्थितीत वाटलं की तो इतक्या दीर्घकाळ टिकला असेल असे खरे वाटले नाही… असो). रामानुजाचार्यांनी अगदी काश्मीरपर्यंत प्रवास केला होता. आयुष्याच्या अखेरच्या काळात त्यांना चोला राजाच्या जावयाने काही कारणाने दंडित केले व त्यांना म्हैसूर च्या होयसळ राजवटीच्या आश्रयाला जावे लागले.
हे मंदिर चोल राजांच्या राजवटीत प्रथम बांधले गेले असण्याची शक्यता आहे.
आठव्या व नवव्या शतकातील तामिळ संत साहित्यात (अल्वर साहित्य) या मंदिराचा
उल्लेख येतो. पुढे दहाव्या शतकातील तामिळ साहित्यात या मंदिराचे उल्लेख
सापडतात. चोलांनी या मंदिराला देणग्या दिल्याचे उल्लेख येतात. चोल, चालुक्य
चोल, पांड्य अशा अनेक राजांच्या राजवटी श्रीरंगम वर राज्य करत असतानाच
पुढे १३११ मध्ये मलिक काफूरची वक्रदृष्टी या व आसपासच्या प्रदेशाकडे वळली
आणि त्याने या मंदिराची लूट केली. त्यामुळे येथील मूर्ती पुन्हा घडवावी
लागली. पुन्हा १३२३ मध्ये मुहंमद बिन तुघलक आला आणि त्यानेही मदुराई व
आसपासच्या प्रदेशातील लोकांवर अनन्वित अत्याचार केले. त्याने तर या
मंदिरातच तळ ठोकला होता. पण त्याआधीच या मंदिरातली सर्व संपत्ती तिरुपतीला
हलविल्याने सुरक्षित राहिली.
यानंतर दक्षिणेत विजयनगर साम्राज्याचा उदय झाला आणि त्यांनी बाजी उलटविली.
मंदिराची पुनर्स्थापना केली. तिरुपतीला नेलेली मूर्ती आणि दागिने परत आणले
गेले व रंगनाथाचे वैभव त्याला परत मिळाले. त्याचे आज असलेले स्वरूप हे
मुख्यत्वेकरून विजयनगर साम्राज्यामुळे मिळाले आहे. पुढे विजयनगरचे
साम्राज्य लयास गेल्यानंतर स्थानिक नायकानी या मंदिराच्या संरक्षणत व
जडणघडणीत हातभार लावला. यानंतर श्रीरंगम वर जरी अर्कोट च्या नबाबाचे
अधिपत्य असले तरी मंदिराचा फारसा ह्रास झाला नाही. ब्रिटिश , फ्रेंच या
सत्ता देखील या सुमारास भारतात मूळ धरू लागली होत्या. त्यानंतर १७८१ च्या
सुमार हैदर अली आणि १७९० च्या सुमारास त्याच मुलगा टिपू यांनीदेखील काही
काळ श्रीरंगम ताब्यात घेण्याचा प्रयत्न केला पण तो फार काळ यशस्वी झाला
नाही. आणि पुढे १८०१ मध्ये तर श्रीरंगम ब्रिटिशांच्या ताब्यात गेले.
संदर्भ – Sri Ranganathaswami, A Temple of Vishnu in Srirangam by Jeannine Auboyer (First Edition, June 1969… Current Ninth Edition 2019)
इतर शिल्पाकृती
याच्या समोरच एक सुंदर मूर्तिकाम असणारा “शेषराया मंडप” आहे. या मंडपाच्या खांबांवर टाचा उंचावलेल्या घोड्यावर बसलेला स्वार व या घोड्याच्या टाचेखाली आलेले विविध प्राणी यांची सुंदर शिल्पे दिसून येतात. यात या प्राण्याच्या शरीरात घुसलेल्या तलवारी बारकाईने दाखविल्या आहेत. या मंडपातच बिभीषणाची वर सांगितलेली कथा आहे व तसेच मगरीच्या तावडीतून सुटणाऱ्या हनुमंताची देखील.
हनुमंत आणि कालनेमी
मूर्च्छित पडलेल्या लक्ष्मणाला शुद्धीवर आणण्यासाठी हिमालयातून संजीवनी वनस्पती रात्रभरात आणण्याची जबाबदारी हनुमंतावर सोपवली जाते. हि बातमी हेरांकरवी रावणाला कळताच त्याच्या वाटेत विघ्न आणण्याकरिता रावण आपल्या कालनेमी नावाच्या मायावी राक्षसाला त्याला आधीच वाटेत गाठून वेळकाढूपणा करावयास सांगतो. त्याप्रमाणे अनिच्छेनेच का होईना, पण कालनेमीला जावेच लागते. तो एका साधूच्या वेशात पुढे जाऊन हनुमंताच्या वाटेवर थांबतो. त्याचा फसवा रामनामाचा जप ऐकून हनुमान काही काळ विश्रांतीसाठी थांबायचे ठरवितो. त्याच्याबरोबर बोलण्यात कालनेमी वेळ काढू लागतो. हनुमंताला पाणी हवे असते तेव्हा तो त्याला शेजारच्या सरोवरावर पाठवतो. तेव्हा एक मगर हनुमंताला पकडून गिळते. पण शक्तिशाली हनुमंत तिचे पोट फाडून बाहेर येतो, तेव्हा तिचा उद्धार होऊन त्याच्या जागी एक अप्सरा प्रकट होते व ती स्वर्गलोकी जाण्यापूर्वी कालनेमीच्या हेतूबद्दल हनुमंताला अवगत करते.
हनुमंत परत येतो व कालनेमीचा वध करतो आणि पुढे आपल्या कार्याला निघून जातो आणि जेव्हा त्याला ती संजीवनी वनस्पती नेमकी समजत नाही तेव्हा अक्खा द्रोणागिरी पर्वतच घेऊन परततो. अशी ती कथा.
यापैकी साधुवेशातील कालनेमी व त्याला भेटणारा हनुमंत, मगरीच्या पोटातून बाहेर येणारा हनुमंत व त्या मगरींद्वारे प्रकट झालेली अप्सरा आणि नंतर कालनेमीला फरफटत नेणार हनुमंत या गोष्टी ३ वेगळ्या पॅनेल्स मध्ये अतिशय उत्तमप्रकारे शिल्पित केल्या आहेत.
याच शेषराया मंडपाच्या समोरचा भला मोठ्ठा १००० खांबी मंडप आहे. प्रत्यक्षात यात ९५३ खांब असल्याची माहिती मिळते. प्रत्येक वेळी येथे प्रवेश दिला जात नाही.
गरुडमंडप
याच्या पुढे आता शिरल्यावर आपल्याला एक भलीमोट्ठी गरुडमूर्ती असलेला गरुडमंडप लागतो. या मंदिराच्या गरुडमंडपात असलेली गरुडाची मूर्ती कदाचित भारतातील गरुडाची सर्वात मोठी मूर्ती असावी. याच्या बरोबर समोरच्या गाभाऱ्यात शेषशयनी रंगनाथस्वामी म्हणजेच श्रीविष्णूची २१ फूट लांब (६.४ मीटर) काळ्या दगडातील अतिशय सुंदर मूर्ती आहे. या गरुड मंडपाच्या विविध खांबांवर देखील काही सुंदर शिल्पे देखील आहेत. यात पक्षाला भरविणारी बालिका, इरले घातलेला गुराखी बालक, गोपींची वस्त्रे पळवून झाडावर बसलेला श्रीकृष्ण आणि झाडाखाली त्याची विनवणी करणाऱ्या गोपी, गरुडाच्या खांद्यावर बसलेला विष्णू, बासरी वाजविणारा श्रीकृष्ण, नृसिंहावतार, कालियामर्दन अशी काही शिल्पे उल्लेखनीय आहेत.
(टिप-मंदिराच्या गाभाऱ्यात देखील बरीच शिल्पे आहेत पण आत मोबाईल वापरता येत नसल्याने येथील फोटो घेता येत नाहीत).
Ekambareswarar Temple-एकांबरेश्वर मंदिर, कांचीपुरम

Sri Ekambareswarar Temple of Kanchipuram is one of the famous temples of Kanchipuram wherein Shiva is worshipped in the form of Earth Linga, a Lingam made out of River Sand. This temple has a 192 feet high Gopuram which is amongst the largest of South Indian Temples. The Temple derives its names from One Mango Tree in it, and hence Shiv here is known as Ekambaranatha.
In Hinduism, the Sapta Puri, or seven holy cities, are Ayodhya,
Mathura, Maya (Haridwar), Kasi (Varanasi), Kanchi (Kanchipuram),
Avantika (Ujjain), and Dvaravati (Dwarka). These cities are considered
to be the holiest Hindu Teerths, and each city has a strong connection
with Hindu deities.
Shiva in Kanchipuram worshipped as Ekambareswarar or Ekambaranathar or
Rajlingeswaram, and is represented by the lingam as Prithvi lingam while
Parvati is depicted as Elavarkuzhali or Kamakshi Amman.
कांचीपुरम ही दक्षिणेतील मंदिरांची नगरी. व म्हणूनच हिंदू धर्मातील पवित्र सप्त पुरींपैकी एक. अयोध्या, मथुरा, माया (हरिद्वार), काशी, काञ्चीपुरम, अवन्तिका (उज्जैन), द्वारिकापुरी ही ती सात पुण्य नगरे. याच कांचीपुरम नगरीत कैलासनाथार चे सुप्रसिद्ध शिवमंदिर आहे तसेच एकांबरेश्वराचे देखील. या मंदिरातील शिव वालुकामय शिवलिंगाच्या स्वरूपात असून ११ टप्पे असलेले १९२ फूट उंचीचे येथील गोपुर हेदेखील दक्षिणेकडील मंदिरांच्या उंच गोपुरांपैकी एक आहे.
मंदिराची कथा

या मंदिराच्या कथेशी पार्वती जोडलेली आहे. एकदा शंकर विश्वाच्या रचना प्रक्रियेत गुंतले असताना पार्वतीने मधेच येऊन लाडिकपणे त्यांचे डोळे झाकले. पण यामुळे त्यांच्या सृष्टिनिर्मिती प्रक्रियेत अडथळा निर्माण झाल्यामुळे शंकर संतापले आणि त्यांनी पार्वतीला आपल्या चुकीचे परिमार्जन करण्यासाठी पृथ्वीवर पाठवून दिले. पार्वती पृथ्वीवर आली ती थेट या कांचीपुरम मध्ये कंबा अथवा वेगवती नदीच्या काठावर. तिथे तिने शिवाला प्रसन्न करण्यासाठी वाळूचे शिवलिंग बनवून एका आंब्याच्या झाडाखाली तप सुरु केले. शिवाने या तपाचरणाची परीक्षा पाहण्याकरिता अनेक विघ्ने आणण्याचा प्रयत्न केला पण पार्वती या सर्व परीक्षांमध्ये उत्तीर्ण झाली. यात शिवाने तिच्यावर अग्नी पाठवला तेव्हा पार्वतीने आपल्या बंधूंची, विष्णूची प्रार्थना केली. विष्णूने या अग्नीला शीतल करण्याकरिता चंद्राची योजना केली व त्याच्या किरणांनी झाड आणि पार्वतीला देखील थंड केले.

त्यानंतर पार्वतीच्या तपश्चर्येत व्यत्यय आणण्यासाठी शिवाने आपल्या जटेतील गंगा या शिवलिंगाला वाहून नेण्यासाठी सोडली तेव्हा पार्वतीने गंगेला पटवून दिले की, त्या बहिणी असल्याने तिने पार्वतीला इजा करू नये. तसेच तिने या शिवलिंगाला मिठी मारली आणि आपल्या छातीशी ते कवळून धरले आणि गंगेचा स्पर्श त्याला होऊ दिला नाही. मग पार्वतीवर प्रसन्न होऊन याच आंब्याच्या झाडाखाली पुढे शिवाने पार्वतीचा स्वीकार केला व म्हणून तो एकांबरेश्वर बनून तिथेच राहिला.
दुसऱ्या एका कथेनुसार शिव व पार्वती फाशांचा खेळ खेळत असताना त्यांच्यात काही वाद झाला व शंकराने तिला कुरूप होण्याचा शाप दिला. त्यामुळे या शापातून मुक्ती मिळविण्यासाठी पार्वती कांची येथे आली व येथे तिने तप केले आणि या ठिकाणच्या आंब्याच्या झाडाखाली त्यांचे पुनर्मिलन झाले म्हणून तो “एक-आम्र-नाथ” किंवा “एकाम्बरनाथ” आणि तपश्चर्येने रूपवान झालेली पार्वती म्हणजेच कामाक्षी. या कामाक्षी देवीचे मंदिर येथून जवळच असून ते कामाक्षी अम्मन मंदिर म्हणून प्रसिद्ध आहे.
शिवकथेतील
हा भाग दर्शविणाऱ्या कथा या एकांबरेश्वर मंदिरातील व तसेच कामाक्षी अम्मन
मंदिरातील अनेक खांबांवर कोरलेल्या आहेत. त्या पाहून, त्यामागची कथा जणू
घेणे उत्कंठावर्धक ठरते. या मंदिरातच ते आंब्याचे झाड अजूनही दाखविले जाते व
या झाडाच्या ४ फांद्या ४ वेगवेगळ्या चवीची आम्रफले देतात असेही सांगितले
जाते. या मंदिरांची परिक्रमा करताना १०८ शिवलिंगे दृष्टीस पडतात. या
मंदिराच्या आवारातच शिवगंगा हा प्रशस्त तलाव देखील आहे. याचबरोबर निळकंठ
पेरुमल हे विष्णूच्या १०८ दिव्यदेशांपैकी एक असलेले मंदिर देखील येथे आहे.

पृथ्वी पंचमहाभूत मंदिर
या मंदिराचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे दक्षिणेकडे जी पंचमहाभूतांची मंदिरे मानली जातात त्यापैकी हे मंदिर एक असून हे मंदिर पृथ्वीतत्वाचे समजले जाते. पृथ्वी, पाणी, अग्नि, वायु आणि आकाश ही ५ तत्त्वे म्हणजे पंचमहाभूते. ही मंदिरे दक्षिण भारतात,म्हणजे चार तामिळनाडू राज्यात आणि एक आंध्र प्रदेशात आहेत. सर्व पाच मंदिरे 78°E आणि 79°E रेखांशाच्या आसपास आणि 10°N आणि 14°N अक्षांशांच्या दरम्यान आहेत.
या मंदिरातील शिवाची काही रूपे
एकांबरेश्वरच्या या मंदिरात शिवाच्या भिक्षाटन शिव स्वरूपाची काही शिल्पे आहेत. या शिल्पाबद्दलची अधिक माहिती आपल्याला “भिक्षाटन शिव” या लिंक वर मिळू शकेल.
या मंदिराच्या विष्णुमंदिराच्या मागच्या बाजूला लिंगोद्भव शिवाचे एक अतिशय सुंदर शिल्प आहे.
मंदिरातील काही सुंदर शिल्पे
या मंदिरांच्या अनेक खांबांवर व तसेच मंदिर परिसरात अनेक छोटी छोटी कथाशिल्पे आहेत. हि शिल्पे ओळखून यांच्या कथा जाणून घेणे देखील एक आनंददायी अनुभव असतो यापैकी काही शिल्पे येथे दिली आहेत. त्या छायाचित्रांवर क्लीक करून त्याविषयीची अधिक माहिती तुम्ही करून घेऊ शकता.
भिक्षाटन शिव-Bhikshatan Shiv,Kailasnathar Temple,Kanchipuram

A different form of Shiva named as BHIKSHATAN SHIV is seen in some of the Shiv Temples of Southern India, including Kailasnathar Temple at Kanchipuram, Tamilnadu. The Story here briefly describes the story of Bhikshatan Shiv as found in various Puranas and its Sculptural representation in various Temples. Interestingly, we can connect the Stories of (1) Lingodbhav Shiv (2) Bhikshatan Shiv (3) Bhairav form of Shiv and (4) Kapalik Shiv though these stories and Sculptures.
कांचीपुरमच्या कैलासनाथार मंदिरात फिरताना शिवाचे एक वेगळेच रूप आपल्याला पाहायला मिळालं आणि याचे वेगळेपण शोधताना एक आगळीवेगळी कथा समोर आली ती म्हणजे “भिक्षाटन” करणाऱ्या शिवाची. ही मूर्ती जवळपास नग्न, म्हणजे सर्वस्वाचा त्याग केलेली आहे आणि भैरवासारखी उग्र देखील नाही. याची कथा थोडक्यात समजली ती अशी…
लिंगोद्भव शिवाच्या स्वरूपाने कालभैरवाला जन्म देत ब्रम्हाचे ५वे शीर कापले. या ब्रह्महत्येच्या पापामुळे ते शीर त्याचा हाताला चिकटले. म्हणून पापाचे परीक्षालन करण्या करिता शिवाने भैरवाचे रुप टाकून कापालिकाचे (ब्रम्हाच्या कपालातून भिक्षा मागणारा) रुप धारण केले. हाच कापालिक म्हणजे देशोदेशी भिक्षाटन करत फिरणारा शिव.

दक्षिणेकडील काही देवळात शिवाचे हे “भिक्षाटन” रुप आढळते. राजाराजा चोलाचा पुत्र राजेंद्र चोला याने बांधलेल्या गंगाईकोंडा चोलापूरम येथील मंदिरात देखील हे आहे. भिक्षाटन करणारा हा शिव तिन्ही लोकात भटकतो तसा तो देवदार वनात (अथवा दारुक वनात) देखील जातो. तेथे ऋषीमुनी यज्ञ कार्यात गुंतलेले असतात. ऋषीपत्नी या शिवाचे नग्न पण तेजस्वी रुप पाहून मोहित होतात व त्यांची वस्त्रे ढळतात, अशीही शिल्पे काही ठिकाणी आहेत. कधीकधी या शिवाबरोबर इतर स्त्रिया, किंवा भिक्षा टोपलीत घेऊन चालणारा सहायक असेही दाखविले जातात. काही ठिकाणी ऋषीमुनी त्याला मारायला धावतात (आपल्या स्त्रियांना नादाला लावल्यामुळे) अशीही शिल्पे आहेत. यात शिल्पांमध्ये बरेचदा शिवाच्या पायात खडावा देखील दाखविल्या जातात. बरेचदा भिक्षा देणारी स्त्री “देवी अन्नपूर्णा” म्हणून देखील दर्शविली जाते.
भिक्षाटन शिवाच्या पुराणातील कथा
पुराणातील कथांनुसार यात वैविध्य आढळते. कूर्म पुराणानुसार या भटकंतीत शिव पुढे वैकुंठाला जातो तेव्हा त्याचे हे कापालिक रूप बघून विष्णूंचा द्वारपाल “विश्वकसेन” त्याला अडवितो तेव्हा संतप्त झालेला भिक्षाटन शिव विश्वकसेनाला आपल्या त्रिशुळाने मारून उचलतो व अजून एक पाप जोडतो. आता हे भिक्षाटन रुप कंकालमूर्तीत परिवर्तित होते व विष्णूकडे आपल्या मुक्ततेसाठी भिक्षा मागते. यावेळी विष्णू त्याच्या मस्तकाची शीर कापून त्याचीच धार अन्नरूपात या कंकालाच्या भिक्षापात्रात टाकतो व त्याला वाराणसीत जाऊन पापक्षालनाचा सल्ला देतो. तसे केल्यावर भिक्षाटन शिवाच्या हस्ताला चिकटलेले ब्रम्हाचे शीर गळून पडते. ही जागा म्हणजेच वाराणसीतील “कपाल मोचन कुंड” याच ठिकाणी विश्वकसेनाचे शव देखील अदृश्य होते व शिवाचे पापक्षालन होऊन तो पुन्हा कैलासावर परततो.

वामन पुराणात हि कथा थोड्या वेगळ्या स्वरूपात येते. या कथेनुसार प्रजापती दक्षाच्या यज्ञात सती पार्वतीने स्वतःला झोकून दिल्यावर तिच्या विरहाने व्याकुळ झालेला व त्याचबरोबर मदनाने त्याला उन्माद आणि विजृम्भण नावाचे दोन बाण मारून विद्ध केले. हा शिव संतापात विश्वात भ्रमण करून जगताला पीडा देत असताना यक्षाधिपती कुबेराचा पुत्र “पांचालिकाने” त्याला पाहिले व शिवाकडून ही दोन्ही अस्त्रे धारण करत तो “पांचालिकेश” झाला आणि शिव पुढे विंध्य पर्वताकडे भिक्षाटनासाठी निघाला तोच शिव म्हणजे हा “भिक्षाटन शिव”. पण शंकराला त्या अवस्थेत पाहून वसिष्ठ पत्नी अरुंधती आणि अत्री पत्नी अनुसूया यांच्या व्यतिरिक्त इतर ऋषीपत्नी मोहित होऊ लागल्या, त्यांची वस्त्रे ढळू लागली आणि म्हणून संतप्त झालेल्या ऋषींनी शिवलिंग पृथ्वीवर पतित होईल असा शाप दिला आणि शंकराची कामभावना गळून पडली, आणि शंकर तेथून अंतर्धान पावले.

याप्रकारे शांत झालेले शंकर वनांत शांत बसलेले असताना कामदेव मदन त्यांच्या मागावर आला. त्याला पाहून शंकर क्रोधीत झाले व त्यांनी आपला तृतीय नेत्र उघडून त्याला भस्म केले, म्हणजेच त्यांनी कामभावनेवर संपूर्ण विजय प्राप्त केला. भस्म झालेला कामदेव मदन त्यानंतर विना अंगाचा म्हणजेच अनंग म्हणून फिरू लागला.

स्कंद पुराणानुसार ही कथा अगदी वेगळ्या स्वरुपात येते. यानुसार दारुक (देवदार) वनातील ऋषींचे गर्वहरण करण्याकरिता शिवाने “भिक्षाटन” रूप धारण केले तर विष्णूने मोहिनीरूप. तेथे तपश्चर्या करणाऱ्या ऋषींचे गर्वहरण करण्याकरिता शिव तेथे भिक्षेला गेले तेव्हा ते सतीच्या विरहाने व्याकुळ व तिच्याच विचारात होते. म्हणून ऋषिपत्नींना त्यांची दया आली व त्या त्यांना भिक्षा देऊ लागल्या. ते सहन न झाल्याने ऋषींनी त्यांना तुम्ही षंढ व्हाल असा शाप दिला पण यानंतर त्या ऋषींना सर्व जागाच लिंगमय भासले व त्याचा आदी आणि अंत त्यांना सापडेना. यावर त्यांनी हि गोष्ट ब्रह्मदेवानं सांगितली तेव्हा ब्रह्मदेवांनी शंकरांना हंसरूप घेऊन त्या लिंगाचे मूळ सापडल्याची कथा सांगितली आणि केतकीच्या फुलाची साक्ष दिली. यानंतर लिंगपूजा सर्वव्यापी झाली व अनेक ठिकाणी शिवलिंगाची स्थापना केली गेली.
भिक्षाटन शिव शिल्प ओळखायचे कसे?

या शिवाच्या रूपाचे वैशिष्ट्य म्हणजे शिवाचे नग्न स्वरूप. यातील शिल्पात बरेचदा शिवचरणी लीन झालेल्या स्त्रिया असतात. कामासक्तीने वस्त्रे ढळलेल्या स्त्रीचे शिल्पदेखील कधी कधी सोबत दाखविलेले असते. तर कधी जमलेली भिक्षा एका टोपलीत सोबत घेऊन चाललेला गण असतो व शिव त्यातीलच काही भाग सोबत असणाऱ्या कुत्र्याला देत असतात. भैरव स्वरूपात हातात ब्रम्हाचे ५वे शीर हातात घेऊन चाललेला शिव असतो. खांद्यावर अथवा हातात त्रिशूल असतो आणि बरेचदा या शिल्पांच्या पायात खडावा असतात ज्या इतर शिव शिल्पांमध्ये आढळून येत नाहीत.

भिक्षाटन शिवाच्या अनेक मूर्ती तामिळनाडूच्या विविध देवळातून पाहायला मिळाल्या. बृहदीश्वर मंदिर (तंजावर), एकांबरेश्वर मंदिर (कांचीपुरम), जळकंठेश्वर मंदिर (वेल्लोर) अशा काही मूर्तींची छायाचित्रे मी येथे टाकली आहेत पण सर्वसाधारणपणे दक्षिणेकडील बऱ्याच मंदिरात एकाहून अनेक खांबांवर शिवाचे भिक्षाटन, भैरव, कापालिक अशी अनेक रूपे सापडतात. फक्त आपण नीट निरीक्षण केले पाहिजे आणि या पाठीमागची कथा आपल्याला समजली तर ती शिल्प कळल्याचा आनंद देखील होतो.
महाराष्ट्रातील काही मंदिरांतील मी घेतलेली छायाचित्रे देखील मग मी चाळली आणि यात मला खिद्रापूरच्या कोप्पेश्वर (Koppeshwar Temple, Khidrapur, Maharashtra) मंदिरात, अंबरनाथच्या आम्रेश्वर शिव मंदिरात (Ambreshwar Temple, Ambarnath, Maharashtra) देखील हि शिल्पे कोरली असल्याचे आढळले.
Temples of Kashmir-काश्मीरमधील मंदिरे
Kashmir is not only a Tourist Hub but it was a major seat of Hindu and Buddhist Religions. This fact is evident from various Hindu Temples of Kashmir and some Buddist Sites.
काश्मीरचे सुप्रसिद्ध शंकराचार्य मंदिर – Shakaracharya Temple

श्रीनगर जवळ एका टेकडीवर सुप्रसिद्ध शिवमंदिर (जेष्ठेश्वर मंदिर) आहे. काश्मीरात येणारे हिंदू पर्यटक या शिवमंदिराला निश्चितच भेट देतात व त्यामुळे येथे भाविकांची फारच वर्दळ असते. सुमारे ८ व्या शतकातील हे मंदिर काश्मीरातील आद्य मंदिरांपैकी एक आहे. या स्थानावर आदि शंकराचार्यांनी वास्तव्य केले होते असे मानतात म्हणून हे शिवमंदिर शंकराचार्यांचे मंदिर म्हणूनच ओळखले जाते. येथील शिवपिंड भव्य आहे.
फ्रान्सिस यंगहाऊसबँड (Francis Younghousband) यांनी काश्मीर (१९११) या पुस्तकात या मंदिराचा उल्लेख केला आहे. हे इ स पूर्व २२० पूर्वीचे असल्याचे त्यांचे म्हणणे आहे व ते गोपादित्याने (इ.स. २५३ ते ३२८) या टेकडीवर बांधले. हे मंदिर पूर्वी ज्येष्ठेश्वर मंदिर म्हणून ओळखले जाई. आद्य शंकराचार्यांच्या वास्तव्याने पुनीत झालेले हे शिवमंदिर सध्या शंकराचार्य मंदिर म्हणून ओळखले जाते. अवघ्या ३२ वर्षाच्या छोट्याश्या कारकिर्दीत आदि शंकराचार्यांनी हिंदू धर्मासाठी बरेच मोठे काम करुन ठेवले आहे.
अवंतीश्वर(शिव), अवंतीस्वामी(विष्णु) मंदिरे
(Avantishwar and Avantiswami Temple)


अनंतनाग आणि श्रीनगर यांना जोडणाऱ्या राष्ट्रीय महामार्गावर अवंतीपुरची दोन मंदिरे आहेत. कर्कोटक राजघराण्याचा पराभव करुन राज्यावर येणाऱ्या राजा अवंतीवर्मन (उत्पल राजघराणे) या राजाने अवंतीपूर शहर वसविले (९ वे शतक) व या २ मंदिरांचे निर्माण देखील केले. यातील अवंतीश्वर (शिवाला समर्पित) आणि अवंतीस्वामी (विष्णूला समर्पित) ही दोन मंदिरे एकमेकांच्या जवळ आहेत. दोन्ही मंदिरांची रचना आणि स्वरूप सारखेच आहे. या राजा अवंतीवर्मनाचे एक शिल्प देखील आपल्याला अवंतीस्वामी मंदिरात आढळते. अवंतीवर्मनच्या कारकिर्दीत या प्रदेशाची भरभराट झाली. अवंतीस्वामी मंदिर हे त्या काळातील काश्मीरच्या दगडी मंदिर वास्तुकलेचे उदाहरण आहे.


मार्तंड (सूर्य) मंदिर – मट्टन – Martand Sun Temple

पहलगाम पासून सुमारे ३० किमी अंतरावर असणाऱ्या मट्टन येथील मार्तंड सुर्य मंदिर हे प्राचीन मंदिरांपैकी एक. काश्मीरचा सम्राट ललितादित्य मुक्तपीड (७ वे शतक) याने हे मंदिर बांधल्याचा उल्लेख कल्हणाच्या राजतरंगिणी या ग्रंथात येतो. आज या मंदिरात सूर्यमूर्ती नसली तरी मंदिराच्या भिंतींच्या एका बाजुला आपल्याला घोड्यावर स्वार असलेला आगळावेगळा सूर्य पाहायला मिळतो. खरं तर मट्टन हे गावाचे नाव देखील मार्तंड या नावावरून तयार झालेले काश्मिरी भाषेतील अपभ्रंशित रूप आहे.
मुस्लिमांच्या शिरकावापूर्वी काश्मीर हे बौद्ध तसेच शैव आणि हिंदू तत्त्वज्ञानाचे केंद्र आणि संस्कृत शिक्षण आणि साहित्याचे केंद्र होते. १४ व्या शतकापर्यंत मात्र काश्मीर मुस्लिमांच्या अधिपत्याखाली आले होते आणि १५ व्या शतकाच्या सुरूवातीस त्यातील बहुतेक मंदिरांचा विध्वंस करण्यात आला त्यात हे मार्तंड मंदिर देखील होते.
मुस्लीम शासक सिकंदर शाह मिरी जो स्वतःला बुत-शिकन म्हणजे मूर्तीभंजक म्हणवून घेई, याने १५ व्या शतकाच्या सुरुवातीस मार्तंड सूर्यमंदिराची तोडफोड करण्याचा आदेश दिला. हे काम सुमारे एक वर्ष चालले असे म्हणतात. यातच त्याने मंदिराच्या गाभाऱ्यात ओंडके टाकून पेटवून देण्याचा आदेश दिला. काश्मीर खोर्यातील हिंदूंचे इस्लाममध्ये धर्मांतर करण्याचा त्याचा प्रयत्न होता, जो मोठ्या प्रमाणावर हिंदूंचा छळ करून, हिंदू-बौद्ध संस्कृतीच्या प्रतिमा नष्ट करून आणि हिंदू आणि बौद्धांच्या मनात दहशत निर्माण करून यशस्वी झाला. त्याने मोठ्या प्रमाणात बौद्ध स्तूप देखील नष्ट केले.
मार्तंड सूर्य मंदिर दगडी शिल्पकलेचा उत्कृष्ट नमुना आहे. यातील काही अवशेष श्रीनगरच्या श्री प्रताप सिंग संग्रहालयात धाडण्यात आले तर काही तेथेच विखुरलेले आहेत. उभ्या असलेल्या वास्तूवरील मूर्त्यांचे विद्रूपीकरण केले गेले तर उरल्यासुरल्या मूर्तीच्या भागांची झिज झाली आहे.
मार्तंड मंदिराचा हिंदी सिनेमातील वापर
पुरातन मार्तंड मंदिर परिसर अतिशय देखणा व निसर्गरम्य असल्याने हिंदी चित्रपटसृष्टीने आपल्या काही गाण्यांच्या छायाचित्रणासाठी याचा उपयोग करून घेतलेला आपल्याला आढळतो. यात १९७० सालच्या मन की आँखे चित्रपटातील वहिदा रहमान यांच्यावर चित्रित झालेल्या “चला भी आ SSS आज रसिया ,ओ जानेवाले आजा तेरी याद सताये” या गाण्यातील पहिल्या कडव्याच्या पार्श्वभूमीवर आपल्याला हे तेव्हाचे भव्य मंदिर दिसते. त्यानंतरचे दुसरे गाणे आहे ते म्हणजे १९७४ सालच्या “आंधी” चित्रपटातील सुप्रसिद्ध “तेरे बिना जिंदगीसे कोई शिकवा तो नही” हे गाणे.

यातील गाण्यात तर एका ठिकाणी संजीव कुमार व सुचित्रा सेन यांच्या मध्ये या मंदिराच्या एका बाजूच्या भिंतीवर कोरलेली अश्वारूढ सूर्यमूर्तीदेखील स्पष्टपणे ओळखता येते.
या दोन्ही गाण्यातील एकेक कडवेच इथे चित्रित केले गेले होते व तरीदेखील या मंदिराचे भव्यपण आपल्या नजरेत भरण्यासारखे होते. मात्र २०१४ साली आलेल्या हैदर या चित्रपटातील “बिस्मिल, बिस्मिल” हे संपूर्ण गाणेच या मंदिराच्या आवारात चित्रित झाले, पण यात या मंदिराचे चित्रण सैतानाची गुफा असे केले गेल्याने व असा सैतानच प्रत्यक्ष या गाण्यातील कथानकाच्या अनुषंगाने दाखविला गेल्याने, हे गाणे तेव्हा विवादास्पद ठरले व या मंदिराचे नाव सर्वसामान्य हिंदूंना माहिती झाले. पण असे असले तरी काश्मीरला जाणारे सर्वच हिंदू पर्यटक या ठिकाणी येतातच असे नाही.
मार्तंड मंदिराची काही पुरातन छायाचित्रे

जॉन बर्क (१८४३-१९००) नावाचा एक आयरिश तरुण ब्रिटिश रॉयल इंजिनीअर्ससोबत फार्मासिस्ट म्हणून भारतात आला होता. त्याला छायाचित्रणात रुची असल्याने तो पेशावर येथील छायाचित्रकार विल्यम बेकर, जे निवृत्त सार्जंट होते त्यांचा सहाय्यक बनला. या द्वयीने १८६४ ते १८६८ या काळात काश्मीरचे बरेच छायाचित्रण केले यातील एक छायाचित्र मार्तंड मंदिराचे देखील होते. तेव्हा उजाड वाटणारा मंदिरा सभोवतालचा परिसर आता मात्र दाट वस्तीने भरून गेला आहे.
१८७० च्या सुमारासचे अजून एक रेखाचित्र / छायाचित्र

ब्रिटीश पुरातत्वशास्त्रज्ञ अलेक्झांडर कनिंगहॅम (१८१४-९३), एक तरुण ब्रिटिश आर्मी अभियंता म्हणून १८४५-४६ च्या पहिल्या शीख युद्धानंतर काश्मीरमध्ये तैनात होते. नोव्हेंबर १८४७ मध्ये, त्यांनी काश्मीरमध्ये अस्तित्वात असलेल्या बहुतेक प्राचीन वास्तूंचे मोजमाप आणि अभ्यास केला. त्यांच्या या कार्यामुळे त्यांना भारतीय पुरातत्वशास्त्राचे जनक म्हणून ओळखले जाऊ लागले. ते आपल्या पुस्तकात म्हणतात
या मंदिराच्या निर्मितीच्या श्लोकांचा अर्थ बराच विवादित आहे – हे मंदिर स्वतः राणादित्यने बांधले होते, आणि अंतराळ, किंवा त्यापैकी किमान एक, त्याची राणी अमृताप्रभा यांनी बांधले होते. रणदित्यच्या कारकिर्दीची तारीख काहीशी अस्पष्ट आहे, परंतु तो इ स पाचव्या शतकाच्या पूर्वार्धात मरण पावला असे मानण्याला जागा आहे. याच कनिंगहॅम यांनी अजून एक मुद्दा प्रकाशात आणला आहे तो म्हणजे इ सनापूर्वी दुसऱ्या शतकात होऊन गेलेल्या टॉलेमी या ग्रीक ख-भूगोल अभ्यासकांचे मत. आपल्याकडे सर्वसाधारणपणे कोणतेही प्रचंड मंदिर पांडवांनी बांधले असे म्हणण्याचा प्रघात आहे. याच प्रकारे काश्मिरातील मंदिरांनादेखील पांडव लारी अथवा पांडवांची घरं असे मानले गेले आहे. याच अनुषंगाने कनिंगहॅम याने टॉलेमीचे एक वाक्य उद्धृत केले आहे ते म्हणजे “पांडवांचे राज्य वितस्ता नदीवर असल्याचा”. दूर ग्रीक मध्ये कुठेतरी असणाऱ्या टोलेमीला देखील इ स पूर्व दुसऱ्या शतकात पांडवांच्या अथवा त्याच्या वंशजांच्या राज्याची व पर्यायाने महाभारताची कल्पना होती असे दिसते.

मंदिरात प्रवेशद्वाराच्या प्रत्येक बाजूला एक लहान अलिप्त खांब असलेली एक उंच मध्यवर्ती इमारत आहे, संपूर्ण मंदिर नक्षीकाम केलेल्या खांबांनी वेढलेल्या मोठ्या चौकोनात उभे आहे. मध्यभागी असलेल्या तिहेरी सोपानासह या मध्यवर्ती इमारतीची लांबी ६३ फूट, पूर्वेकडील बाजूस ३६ फूट रुंदी आणि पश्चिमेकडील किंवा प्रवेशद्वाराच्या टोकाला केवळ २७ फूट आहे. या मंदिराला सर्वसाधारण हिंदू मंदिरांप्रमाणे अर्ध मंडप, अंतराळ व गर्भ गृह आहे.

आजही मंदिर पाहताना या सर्व खुणा व मंदिराच्या सभोताली असलेली देवकोष्ठे आपल्याला दिसतात. त्यांची संख्या ६४ अथवा ८४ असावी. मंदिराचा जीर्णोद्धार सुरु असल्याने काही वर्षातच हे मंदिर पुन्हा आपल्याला त्याच्या गत वैभवात पाहायला मिळेल अशी अपेक्षा आहे. मंदिराच्या सभोवताली फेरफटका मारताना आपल्याला त्याच्या वेगवेगळ्या भागातील सौन्दर्याचे दर्शन होते. मंदिर परिसर जसा भव्य आहे तसेच हे मंदिर देखील. इतक्या विनाशानंतर व इतक्या वर्षांच्या पडझडीनंतर देखील आजही या मंदिराच्या अंतर्भागातील व बाहेरील भावावरील विविध भावमुर्ती त्याच्या गतवैभवाची साक्ष देत उभ्या आहेत. त्यामुळे हे मंदिर पाहायला जाण्यापूर्वी त्याच्या वैभवाचा हा इतिहास माहित करून घ्यायला हवा.
टीप : आमच्या या आगळ्यावेगळ्या “काश्मीर मंदिर” सहलीचे आयोजन पुण्याच्या मेघना बोकील यांनी केले होते व कोल्हापूरचे इंडोलॉजिस्ट श्री इंद्रनील बंकापूरे यांनी मंदिरांबाबत मार्गदर्शन केले.
Hindu/Buddhist Spiritual Kashmir आम्ही पाहिलेले काश्मीर
Hindu/Buddhist Spiritual Kashmir – सर्वसाधारणपणे प्रत्येक व्यक्तीची आयुष्यात एकदा तरी काश्मीरला जायची इच्छा असते ती तेथील निसर्गसौन्दर्याचं वर्णन ऐकून. तिथली हिमाने आच्छादलेली गिरिशिखरे, सुंदर बागातील रंगबिरंगी ट्युलिपची फुलं, हिंदी सिनेमात वर्षानुवर्षे पाहिलेल्या सफरचंद, अक्रोड, केशर वगैरेंच्या बागा, तेथील बर्फात खेळण्याची वर्णनं या सर्वानी आपली उत्सुकता चाळवली नाही तर नवलच. त्याबरोबरच तेथील पश्मीना मेंढीच्या हातमागावर विणलेल्या शाली, विणकाम केलेले काश्मिरी ड्रेस मटेरियल, क्रिकेटच्या बॅट, कार्पेट्स या सर्व गोष्टी जेथे बनतात त्या जागी जाऊन खरेदी करणं ओघानेच येतं. काश्मीर पर्यटनावर असलेले दहशतवादाचे सावट आता ३७० कलम हटवले गेल्यावर बऱ्याच अंशी कमी झाल्याने व गेली २ वर्षे असलेले कोरोनाचे सावट देखील दूर झाल्याने काश्मिरात होणारी पर्यटकांची वर्दळ देखील आता वाढली आहे.

काश्मीरला जाणारा पर्यटक असतो आनंदात रमणारा. शिकाऱ्यात बसून दल सरोवरात फेरफटका मारायचा, एखादी रात्र याच सरोवरातील हाऊस बोट मधील ऐषोरामी खोल्यांमध्ये घालवायची, येथील अरु व बेताब व्हॅली यांसारख्या सुप्रसिद्ध दऱ्यांमध्ये फेरफटका मारायचा, येथील उद्यानांमध्ये काश्मिरी वेशभूषा करून छायाचित्र काढायची हेच पर्यटकांचे उद्दिष्ट असते.
यात सर्वच वयोगटातील पर्यटक असतात. यात लग्नानंतर मधुचंद्राला येणारी जोडपी जशी असतात तशीच मध्यमवयीन व आपापल्या लहानग्यांबरोबर येणारी जोडपी देखील असतात. यांच्या बरोबरीने पन्नाशी-पार व वृद्धत्वाकडे झुकलेले उतारवयीन पर्यटक देखील असतात. त्यामुळे आपल्याला अनेक नामवंत सहलसंस्थांचे सहल व्यवस्थापक आणि त्यांच्यासोबत जाणारा एक घोळका असेही दृश्य बरेचदा दिसते. यातही बरेच महाराष्ट्रातील पर्यटक असल्याने जागोजागी बरेचदा मराठी ऐकायला मिळते.
श्रीनगर, गुलमर्ग, सोनमर्ग, पहलगाम ही आपल्या सर्वाना, ऐकून का होईना, परिचित असलेली पर्यटन स्थळे. आपल्या ५ ते ८ दिवसांच्या पर्यटनात हे पर्यटक जमेल त्या ठिकाणी प्रवास करतात व आनंदाच्या आठवणी सोबत घेऊन परततात.
पण या सर्वांपलीकडे देखील एक काश्मीर आहे. ते आहे ऐतिहासिक हिंदू व बौद्ध काश्मीर(Hindu/Buddhist Spiritual Kashmir) पण या वैभवशाली इतिहासाची आठवण अथवा माहिती फार थोड्या पर्यटकांना असते व ती देखील बरेचदा काश्मीरचे शेवटचे महाराज हरिसिंह यांची माहिती अथवा श्रीनगर मधीलच शंकराचार्य मंदिर, एवढीच मर्यादित असते. याचे महत्वाचे कारण म्हणजे बहुसंख्य पर्यटकांचा कल लक्षात घेऊनच पर्यटन संस्था त्यांच्या सहलीचे आयोजन बागा, खरेदी बाजार, दुकानं, बर्फाळ ठिकाणं या ठिकाणांसाठी करतात. पण या पलीकडेदेखील काश्मिरात तेथील देदीप्यमान इतिहासाची आठवण करून देतील असे स्तूप, पुरातन मंदिरांचे अवशेष व काही सुस्थितीतील मंदिरे आहेत. आपल्याला काश्मीरचे मूळ स्वरूप समजावून घ्यायचे असेल तर या जागा आवर्जून पाहायला हव्यात. काही वेळा लांबच्या अंतरांमुळे हे शक्य होत नसेल तर श्रीनगरातील मुख्य ठिकाणी असलेले श्री. प्रताप सिंह (SPS) हे संग्रहालय तर किमान ३-४ तासांचा अवधी काढून पाहायलाच हवे.
यासाठी थोडी पूर्वतयारी केली तर ते फायद्याचे ठरू शकेल. हा अभ्यास करण्यासाठी काश्मीरचा सुप्रसिद्ध कवी व इतिहासकार कल्हण याचे “राजतरंगिणी” हे पुस्तक नजरेखालून घालायला हवे. हे पुस्तक PDF स्वरूपात मराठीत देखील उपलब्ध आहे.
हा सर्व अभ्यास करून काश्मिरातील मोजकी सुंदर ठिकाणं, मंदिरं, स्तूप, अवशेष पाहता येऊ शकतात. यात हारवन येथील स्तूपाचे अवशेष, परिहासपूर येथील सम्राट ललितादित्याच्या राजधानीचे अवशेष, अवंतिपुर येथील अवंतीश्वर व अवंतीस्वामी मंदिरांचे अवशेष , सम्राट ललितादित्याने मट्टन (मार्तंडचे अपभ्रंशित रूप) या ठिकाणी बांधलेले सुप्रसिद्ध मार्तंड (सूर्य) मंदिर, जेष्ठागौरी व जेष्ठेश्वर (शंकराचार्य) मंदिर यांसारख्या असंख्य मंदिरांचा समावेश होतो. या काश्मिरात आपल्याला काय पाहायला मिळेल याची थोडक्यात माहिती आपण घेऊ.
हारवन येथील बौद्ध स्तूपाचे अवशेष

हारवन या श्रीनगरच्या बाहेरील बाजूस असलेल्या गावात, जुन्या बौद्ध मठाचे अवशेष आहेत. त्याच्या अवशेषांवरून या जागेचे महत्त्व समजणे फार कठीण आहे. परंतु या प्राचीन मठाने बौद्ध धर्माच्या इतिहासात मोलाची भूमिका बजावली आहे. कुंडलवनच्या ज्या परिसरात कुशाण सम्राट कनिष्क याच्या आदेशा वरुन इसवी सनाच्या पहिल्या शतकात बौद्ध धर्माची चौथी परिषद भरली होती, तोच हा परिसर असावा असे अभ्यासकांचे म्हणणे आहे. याच परिषदेत बौद्ध धर्माच्या महायान व हीनयान पंथांचा देखील उदय झाला असे मानण्यात येते.
Harwan is a historic Buddist place in Srinagar, (Jammu and Kashmir, India). It is nearly is 21 kilometers from the centre of Srinagar city and features remnants of Buddhist monuments.
इ.स.च्या पहिल्या शतकात काश्मीरमध्ये बौद्ध धर्माची भरभराट झाली त्यावेळी काश्मीर कुशाण साम्राज्याचा एक भाग होता. त्याचा महान सम्राट, कनिष्क (पहिला) हा बौद्ध धर्माचा समर्थक होता. त्याने पश्चिम अफगाणिस्तानपासून दक्षिणेकडील पाटलीपुत्र आणि मध्य आशिया आणि चीनमधील तारिम खोऱ्यापासून मध्य भारतापर्यंत पसरलेल्या विशाल साम्राज्यावर राज्य केले. काश्मीर हा देखील साम्राज्याचा एक भाग होता आणि गांधार प्रदेशाच्या पूर्वेकडील टोकाला वसला होता. या सम्राटाने व काश्मीर या स्थानाने, पुढे बौद्ध धर्माच्या वाढीसाठी आणि प्रसारासाठी महत्त्वाची भूमिका बजाविली, ती या चौथ्या बौद्ध धर्मीय परिषदेच्या स्वरूपात.
कनिष्काच्या काळापासून पुढे ८ व्या शतकापर्यंत बौद्ध धर्म हा काश्मीरमधील मुख्य धर्म राहिला, त्यानंतर त्याची जागा हळूहळू हिंदू धर्माच्या पुनरुज्जीवनाने घेतली. त्यानंतरच्या काळात, काही शतके, काश्मीरमध्ये इस्लामच्या आगमनाने बौद्ध धर्म नाहीसा होईपर्यंत दोघेही(हिंदू व बौद्ध धर्म) एकत्रित स्वरूपात अस्तित्वात होते.
हारवन मठ नेमका कधी बांधला गेला हे निश्चित सांगता येणे कठीण असले तरी उत्खननात सापडलेले पुरातत्वीय अवशेष १ल्या ते ६व्या शतकातील आहेत. या काळात, काश्मीरमध्ये असंख्य बौद्ध मठ होते, ज्यामध्ये हारवन आणि बारामुल्ला जिल्ह्यातील उष्कूर हे सर्वात प्रमुख होते. दुर्दैवाने, आज फारच थोडे पर्यटक, हारवन येथील बौद्ध स्थळाच्या अवशेषांना भेट देतात. हारवन हे गाव श्रीनगरच्या ईशान्येस सुमारे १८ किमी वर आहे. मुख्य रस्त्याच्या अगदी बाजूला एक छोटासा फलक आपल्याला मार्ग दर्शक ठरतो. येथून सुमारे १ किमी अंतर चढत वर गेल्यावर आपल्याला अत्यंत उत्कृष्ट अवस्थेत जतन केले जात असलेले हे स्थळ दृष्टीपथात येते.

या ठिकाणी खालच्या भागात विहार सदृश्य बांधकामाचे अवशेष दिसतात तर वरच्या भागात मंदिराच्या प्रकारची गोलाकार रचना (अथवा स्तूप) आणि एक अंगण होते असे दिसते. या वरच्या भागाच्या मागे, अजून उत्खनन बाकी असलेल्या आणखी संरचनांचे अवशेष असावेत. एकेकाळी संपूर्ण संकुल संपूर्ण टेकडीवर पसरलेले असावे असे वाटते.
या ठिकाणचे अजून एक वैशिष्ट्य म्हणजे येथे जतन केलेले तत्कालीन दगड, गोटे व मातीने लिंपलेल्या भिंतींचे अवशेष. या विहारातील भिंतींच्या तत्कालीन अवशेषांचे काही ठिकाणी पुनर्निर्माण करीत त्यांची योग्य ती निगाही राखली जात आहे.
बौद्ध धर्माच्या प्रसाराच्या गाथेमध्ये हारवन मठाचे स्थान खूप महत्त्वाचे आहे. कारण ते या धर्माच्या स्थापनेपासून त्याचा सर्व दिशांना प्रसार होण्याचे एक मध्यवर्ती ठिकाण होते. दुर्दैवाने, आधुनिक काळात या जागेचे महत्त्व कुठेतरी हरवलेले दिसते. त्याच बरोबर बौद्ध धर्माच्या इतिहासातील काश्मीरचे महत्त्व देखील हरवले.
परिहासपूर येथील सम्राट ललितादित्याच्या साम्राज्याचे अवशेष

परिहासपूर अथवा पारसपूर हे काश्मीर खोर्यातील श्रीनगरच्या वायव्येस २२ किलोमीटर अंतरावर असलेले एक छोटेसे शहर. हे तत्कालीन झेलम नदीच्या प्रवाहाच्या वरच्या पठारावर बांधले गेले होते. हि नदी तेव्हा वितस्ता या नावाने ओळखली जाई. काश्मीरवर कर्कोटक घराण्याचा ललितादित्य मुक्तपीड राजा राज्य करत असताना (६९५-७३१) त्याने हे शहर वसवले होते आणि त्यांच्या कारकिर्दीत काश्मीरची राजधानी त्याने श्रीनगरहून परिहासपूर इथे हलविली. याविषयीची माहिती आपल्याला राजतरंगिणी या ऐतिहासिक दस्तावेजातून मिळते.

राजतरंगिणी हा कल्हण या कवीचा काश्मीरविषयक इतिहासाचा सुप्रसिद्ध ग्रंथ. कल्हण हा हर्ष राजाच्या कारकिर्दीत (१०८९-११०१) इ स ११०० च्या सुमारास जन्मला. त्याचे वडील चंपक हे हर्ष राजाच्या दरबारात प्रतिष्ठित मंत्री होते. या कल्हणानेच पुढे ११४८-४९ च्या सुमारास ८ तरंग (भाग) असलेला हा ग्रंथ सिद्ध केला. आपल्याला त्याकाळी ज्ञात असलेल्या राजांच्या वंशावळी व त्यांचा इतिहास कल्हणाने या ग्रंथात शब्दबद्ध केल्याने याचे ऐतिहासिक मोल आहे. कल्हणाच्या या ग्रंथानुसार सम्राट ललितादित्याने परिहासपूर या भागात आपले निवासस्थान आणि चार मंदिरे बांधली. मंदिरांमध्ये विष्णूची मुक्तकेशव, परिहासकेशव, गोवर्धनधर व महावराह अशी चार मंदिरे होती. सम्राट ललितादित्याने यातील मुक्तकेशव मंदिरातील विष्णूची प्रतिमा तयार करण्यासाठी ८४००० तोळे सोने वापरले होते. याच्याशिवाय येथे एक तांब्याची बुद्धप्रतिमा देखील होती.
ललितादित्यच्या मृत्यूनंतर त्याच्या मुलाने, वज्रदित्याने आपली राजधानी परत श्रीनगरला हलविली. त्यानंतर सत्तेवर आलेल्या राजा अवंतीवर्मन याने ती पुन्हा तेथे आणली खरी परंतू वितस्ता (म्हणजेच आताची झेलम) नदीच्या प्रवाहातील अनैसर्गिक बदलांमुळे ती येथे फार काळ ठेवता आली नाही. अवंती वर्मनचा मुलगा शंकर वर्मन याने (इ स ८८३ ते ९०१) मग त्याची राजधानी शंकरपूर या नवीन शहरात हलवली. त्याने परिहासपूर येथील दगड त्याचे नवीन शहर वसविण्यासाठी वापरले व परिहासपूरचा ह्रास सुरु झाला. पुढे आणखी दोन शतकानंतर राजा हर्ष आणि उक्कला यांच्यातील युद्धादरम्यान (१०८९-११०१) उक्कलाने परिहासपूरमध्ये आश्रय घेतला. राजा हर्षाने उक्काला यापैकी एका इमारतीत असल्याचा विश्वास ठेवून ती जागा पेटवली. त्याने परिहासपूरच्या मूर्ती तोडल्या आणि वितळविल्या. पुढे चौदाव्या शतकात सुलतान सिकंदर बुतशिकन (इ स १३९४-१४१६) ने या मंदिरांचा संपूर्ण नाश केला.
पण लुटमार तिथेच संपली नाही. कल्हणाच्या राजतरंगिणी ग्रंथाचा ठावठिकाणा शोधून अतीव परिश्रम घेऊन इंग्रजी भाषांतर करणारे महान ब्रिटीश इंडोलॉजिस्ट ऑरिएल स्टीन यांनी राजतरंगिणी ग्रंथाच्या वर्णनाचा माग काढत १८९२ मध्ये या स्थळाला भेट दिली व या मंदिरांच्या अवशेषांचा धांडोळा घेतला. त्यानंतर पुन्हा मे १८९६ मध्ये पुन्हा एकदा या ठिकाणाला भेट दिली व त्यांना तेथील परिस्थिती पाहून धक्काच बसला. त्यांच्या दोन भेटींमध्ये अनेक शिल्पे आणि दगड गहाळ असल्याचे त्यांच्या लक्षात आले. जम्मू-काश्मीरचे महाराज झेलमचा बग्गी रस्ता बांधत होते आणि परिहासपुर येथील दगड या रस्त्याच्या बांधकामासाठी वापरण्यात येत असल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर ऑरिएल स्टीनने महाराजांच्या दरबारात असलेल्या Sir Adelbert Talbot या ब्रिटिश अधिकाऱ्याशी संपर्क साधला आणि जे काही उरलेले अवशेष होते त्याचा उरला सुरला विनाश थांबविला.
आज आपल्याला या ठिकाणी ललितादित्याच्या वाड्याचे अवशेष पाहायला मिळतात. भव्य जोती असलेल्या या इमारतींचे अवशेष आपल्याला या वाड्यांची , मंदिराची भव्यता दर्शवितात. यात आपल्याला तत्कालीन वाड्यातील सांडपाण्याचा निचरा करण्यासाठी असणारी सोय देखील दृष्टीस पडते.
मंदिराच्या जोत्याचे अवशेष असणाऱ्या इमारतीला चारही दिशांना पायऱ्या आहेत. या पायऱ्यांच्या सुरुवातीलाच दोन्ही बाजूला मांडी घालून बसलेले भारवाहक यक्ष दिसतात. मात्र त्यानंतर केवळ वरच्या चौथऱ्यावर एक चबुतरा आहे या सर्व दगड इतरत्र विखुरलेले आढळतात. याही मंदिराच्या व येथील राजवाड्याच्या जीर्णोद्धाराचे काम सुरु आहे. येथे अनेक भग्न मुर्त्या व दगड विखुरलेले आहेत.
श्री प्रतापसिंग (SPS) संग्रहालय
काश्मीरच्या अनेक पाहण्यासारख्या गोष्टींपैकी एक म्हणजे श्रीनगरमधील अप्रतिम श्री प्रतापसिंग संग्रहालय. मात्र काश्मीर पहायला येणाऱ्या पर्यटकांपैकी बरेचसे पर्यटक काश्मीरच्या या महत्त्वाच्या ठेव्याकडे दुर्लक्षच करतात.

भारताच्या इतिहासात काश्मीरला अत्यंत महत्वाचे स्थान आहे. काश्मीरचा
इतिहास जाणून घेतला तर हे स्थान महात्म्य आपल्या लक्षात येते व ते कळले तर
आपला काश्मीर दर्शनाचा आनंद द्विगुणित होऊ शकतो.
इ स १८९८ मधे स्थापन झालेले हे संग्रहालय म्हणजे एक खजिनाच. हा खजिना
आपल्याला ६ दालनांत दृष्टीपथात येतो. यात पुरातत्त्वशास्त्र (Archeology),
नाणकशास्त्र (Numismatic), Decorative Art, Jewelry, Arms and Artillery,
चित्रकला (Painting), विविध भाषांमधील विविध प्रकारची हस्तलिखिते
(Manuscripts in various forms and Scripts), संस्कृती व समाज (Culture and
Society), Textile इत्यादीच्या ८०,००० हून अधिक वस्तूंचा समावेश होतो आणि
अभ्यासकांसाठी तर दिवसही अपुरा पडेल इतका हा ठेवा आहे.


या संग्रहालयाबद्दल मायाजालावर इतर बरीच माहीती उपलब्ध आहे, तरीदेखिल प्रत्यक्ष बघण्याला पर्यायच नाही तेव्हा पुढच्या वेळी तुम्ही काश्मीरला याल तेव्हा श्रीनगरातील हा ठेवा पाहण्यासाठी १० ते ४ मधील किमान २ तासाचावेळ बाजुला काढून ठेवा.
काश्मीरमधील पर्यटक (अ)सुविधा
काश्मीर हे एवढे सुप्रसिद्ध पर्यटन स्थळ असूनदेखील येथे पर्यटकांसाठी असणाऱ्या सुविधांची मात्र वानवाच आहे. जे पर्यटक चांगल्या दर्जाच्या हॉटेल्स मध्ये (तीन ताराकिंत किंवा जास्त) राहतात त्यात त्यांना चांगल्या दर्जाची सेवा, स्वच्छतागृहे व न्याहारी उपलब्ध असते. थंडीपासून संरक्षणाकरिता उबदार खोल्या, बिछाने उपलब्ध असतात. पण सर्वसाधारण मध्यमवर्गीय पर्यटकांना मात्र या सोयी अभावानेच मिळतात. एकत्रितपणे बोलायचं झालं तर प्रवासादरम्यान, उद्यानांमध्ये अथवा इतर प्रेक्षणीय स्थळांपाशी तर स्वच्छतागृहांची परिस्थिती तर फारच वाईट आहे. म्हणूनच स्त्रियांची तर फारच कुचंबणा होते. सर्वसाधारणपणे काश्मीरचे अनुभव सांगताना तिथला निसर्ग, तिथली थंडी, खरेदी यांच्या वर्णनात स्वच्छतागृहे, उपाहारगृहे, भोजनगृहे यांच्याबद्दल आपल्याला फारसे (वाईट) वाचायला अथवा ऐकायला मिळत नाही पण ते देखील एक भयानक वास्तव आहे. हे काही वेळा हाऊस बोटला देखील लागू पडल्याचे आम्ही ऐकले आहे. आपण “हे काय, आठवडाभरासाठीच आहे! सहन करू” या मानसिकतेत जातो व त्याची वाच्यता करीत नाही.
पर्यटन हेच काश्मीरमधील मुख्य उत्पन्नाचे साधन आहे, पण हे करतानाही पर्यटकांना लुबाडण्याचा प्रकार देखील घडतात. अतीव थंड व बर्फाच्या ठिकाणी जाणाऱ्या पर्यटकांना जॅकेट्स, गमबूट्स , हातमौजे वगैरे पुरविण्याच्या व्यवसायाखाली बरेच लुबाडले जाते, अरेरावी केली जाते. प्रत्येक ठिकाणी कोणतीही सेवा पुरविली किंवा पुरवायला मदत केली तरी घसघशीत बक्षिसाची अपेक्षा ठेवली जाते, नव्हे त्यावर अडवणूक देखील केली जाते व एखाद्या ठिकाणी थोडेसे कमी झाले तर पुढे निकृष्ट दर्जाची सेवा पुरविली जाते. येथील सेवादरांवर सरकारचे कोणतेही नियंत्रण नसल्याने सामान्य पर्यटक लुबाडला जातो, पण याची वाच्यता मात्र टाळली जाते व त्यामुळे याबद्दल पुढच्या पर्यटकांना काहीच समजत नाही. हाच प्रकार हाऊसबोट वर मिळणाऱ्या सुविधा, तेथील स्वच्छता याबाबतीतही घडतो.
काश्मीर सुंदर आहेच पण त्याचे सौन्दर्य राखुन पर्यटन वाढवायचे असेल तर पुरविल्या जाणाऱ्या सेवा सुविधा यांमध्ये व्यवसायिकपणा यायला हवा.
काश्मीरमध्ये काही सुंदर पुरातन मंदिरदेखील आहेत. यातील काही प्रसिद्ध मंदिरांबद्दल म्हणजे अवंतिस्वामी, अवंतीश्वर व मार्तंड मंदिर याविषयी एका वेगळ्या लेखातून पाहू.
मदुराईचे मीनाक्षी अम्मन सुन्दरेश्वर मंदिर -Meenakshi Amman Temple
The historic Meenakshi Amman Temple is located in the heart of historic Madurai city, about a kilometre south of the Vaigai River.
मदुराई शहराच्या केंद्रस्थानी असलेले हे पार्वती देवीचे, देवी मिनाक्षीच्या स्वरूपातील मंदिर. या मंदिराची गणना ५१ शक्तिपीठातील एका मुख्य मंदिरात देखील होते. मीनाक्षी अम्मन सुंदरेश्वर मंदिर हे पांड्य सम्राट सदयवर्मन कुलसेकरन प्रथम (इ स ११९० ते १२०५) यांनी बांधले होते.त्यानी सुंदरेश्वर मंदिराच्या प्रवेशद्वारावर तीन मजली गोपुरमचे मुख्य भाग बांधले आणि देवी मीनाक्षी तीर्थाचा मध्य भाग देखील. हेच या मंदिराचे प्राचीन भाग आहेत.

१४व्या शतकाच्या सुरवातीला (इ. स. १३११), दिल्लीच्या मुस्लिम आक्रमणकारी मलिक काफुरच्या सैन्याने हे मंदिर लुटले. मलिक काफूरला हि संधी मिळाली ती मरवर्मन कुलसेखरन या दोन पांड्य राजपुत्रांच्या दुहीमुळे. त्याचबरोबर त्याने दक्षिण भारतातील इतर अनेक मंदिरे व शहरे देखील लुटली. विजयनगर साम्राज्याच्या शासकांनी सुमारे ६० वर्षानंतर म्हणजे इ.स. १३७१ ला मदुराईचा ताबा मिळविला व या मंदिराची पुनर्बांधणी केली व त्याचे गर्भगृह दर्शनासाठी पुन्हा उघडले. या दरम्यान मंदिराची पुरती वाताहात झाली होती. मुस्लिम शासकांनी प्रजेवर अनन्वित अत्याचार केल्याच्या कहाण्या इतिहासात नोंदलेल्या आहेत. अरबी प्रवासी इब्न बतूता याने इ.स. १३४२ मध्ये या भागाला भेट दिली होती, त्यानेही या अत्याचारांची वर्णने केलेली आहेत. विजयनगरच्या साम्राज्याची मदुराईवरील पकड सैल झाल्यावर १६व्या शतकाच्या मध्यावर, नायकारानी आपले वर्चस्व मदुराईमध्ये प्रस्थापित केले. यानतंर पुढे मदुराईवर नायकारांचे राज्य १७३९-४० पर्यंत चालले. पुढे सुमारे ३ वर्षे राघोजी भोसल्यांच्या नेतृत्वाखालील मराठा फौजेने मदुराई आपल्या ताब्यात ठेवले होते. यानंतर अर्कोट चा नबाब, पुढे ब्रिटिश अशी मदुराईच्या वर्चस्वाची लढाई सुरूच होती व त्यामुळे या प्रदेशात बरीच अशांतता होती. अखेरीस १७९२ ला मदुराई ब्रिटिशांच्या ताब्यात गेले.

या सर्व धामधुमीच्या काळात या देवळावर देखील बऱ्याच आपत्ती ओढविल्या. मलिक काफूरने नष्ट केलेले मंदिर १३७० च्या सुमारास पुन्हा उभारायला सुरुवात झाली होती पण या मंदिराचा खरा विस्तार थिरुमलाई नायक (इ स १६२३-५५) यांच्या कारकिर्दीत झाला. या मंदिराची ४ मुख्य गोपुर प्रवेशद्वारे याच सुमारास बांधली गेली. यातील दक्षिण गोपुर सर्वात उंच आहे व मंदिरातील छायाचित्रकार त्यातील सुवर्णकमळ तलावाच्या व याच गोपुराच्या पार्श्वभूमीवर छायाचित्रे घेत असतात. (सध्या मंदिरात मोबाईल नेण्यास परवानगी नाही).
मीनाक्षी अम्मन मंदिराची आख्यायिका
भारतातील सर्व मंदिरांना जशा आख्यायिका असतात तशीच एक या मंदिराबाबत देखील आहे. मीनाक्षीची कथा पांड्य राजा मलयध्वज व त्याची राणी कांचनमाला यापासून सुरु होते. मलयध्वज राजाला मुल बाळ नव्हते म्हणून त्याने पुत्रकामेष्टी यज्ञ केला व यातून त्याला ३ वर्षाच्या मुलीची प्राप्ती झाली. तिला ३ स्तन होते व ही देवी पार्वतीचाच अवतार होती. मुलगी व तीही अशा अवस्थेत, पाहून राजा व राणी चिंतित झाले. पण त्याचवेळी देवतांनी त्यांना सांगितले की काही चिंता करू नका. योग्य वेळ येताच हिला चांगला वर मिळेल. त्याला पाहताच हिचा तिसरा स्तन गळून पडेल व पुढे हे राज्य देखील तो सांभाळेल.

मलयध्वज व कांचनमालेने या “मीन – नयनी” मिनाक्षीला पुत्राप्रमाणे वाढविले. राजा मलयध्वज निधन पावल्यावर मिनाक्षीला राज्याभिषेक करण्यात आला. तिनेदेखील राज्य उत्तरेकडे वाढविण्याकरिता लढाया सुरु केल्या ते थेट हिमालयातील देवलोकापर्यंत जात. तिने देवांचा पराभव केला तेव्हा देवांनी शंकराला साकडे घातले. शंकरांनी गणांना युद्धासाठी पाठविले, तेही पराभूत झाले. तेव्हा शिवशंकर स्वतः रणात आले. त्यांना पाहताच मीनाक्षीचा तिसरा स्तन गळून पडला व आपला जीवनसाथी सापडल्याचे तिच्या लक्षात आले. तिने शंकराना आपली जन्मकहाणी सांगितली व विवाहाची विनंती केली, जी त्यानी मान्य केली. त्यानी तिला परत आपल्या राज्यात, मदुराईला, जाण्यास सांगितले व स्वतः ८ दिवसांनी तेथे पोहोचले. मिनाक्षीला वडील नसल्याने मोठ्या भावाच्या नात्याने विष्णूने तिचे कन्यादान केले. हा प्रसंग सुंदरेश्वर मंदिराच्या नंदीमंडपातील एका शिल्पामधे कोरलेला आहे व तसेच १००० खांबी मंदिरात असलेल्या एका चित्रात देखील चितारला आहे. हे मंदिर म्हणजेच मीनाक्षी – सुंदरेश्वर यांचे विवाह स्थळ असल्याची मान्यता आहे.
मंदिराचा परिसर बराच विशाल (सुमारे १४ एकर) असून याच्या पूर्व, पश्चिम, उत्तर व दक्षिण दिशांना उंच गोपुरे आहेत. यातील दक्षिणेकडील गोपूर सर्वात उंच आहे. ही सर्व गोपुरे असंख्य पौराणिक शिल्पकृतीनी भरलेली आहेत. याचबरोबर या मंदिरात व प्रांगणात असंख्य शिल्पे आहेत. याच्या पूर्व भागात एक १००० खांबी मंडप देखील आहे (यात प्रत्यक्षात ९८५ खांब आहेत). या मंदिराभोवतीच वैगाई नदीकाठी संपूर्ण मदुराई शहर वसलेले आहे.
मंदिरातील शिल्पे
मीनाक्षी व सुन्दरेश्वर शिव अशी दोन वेगवेगळी मंदिरे यात आहेत. हे मंदिर अनेक उत्कृष्ट शिल्पाकृतींनी नटलेले आहे. यातील काही छायाचित्रे (पूर्वी घेतलेली असल्याने) मायाजालावर उपलब्ध आहेत किंवा संबंधित पुस्तकांमध्ये पाहायला मिळू शकतात. यात सुन्दरेश्वर मंदिरासमोरील नंदीमंडपात नंदीच्या सभोवतालच्या खांबांवर मीनाक्षी-शिव विवाहाच्या वेळी विष्णू कन्यादान करीत असतानाचे सुंदर शिल्प आहेत. त्याचबरोबर येथे अंधकासूर वध, त्रिपुरान्तक शिव, पिचाण्डेश्वर शिव, गजासुर वध करणारा शिव अशी सुंदर शिल्पे आहेत.

या मंदिराच्या आवारात असलेल्या १००० खांबी मंडपात मीनाक्षी पट्टाभिषेक (तंजावर शैलीतील) व तिच्या सुन्दरेश्वराशी विवाहाचे अशी २ सुंदर चित्रे आहेत व याच ठिकाणच्या एका कोपऱ्यात संगीत खांब आहेत. या दगडी खांबांवर हलकासा आघात केला असता आपल्याला यातून वेगवेगळे सूर ऐकू येतात.
मंदिरातील देवतांची पालखी संध्याकाळी ७ च्या सुमारास पूर्व गोपुरातून
बाहेर काढून मंदिराच्या बाहेरील भागात फिरविली जाते. हा सोहळा आपल्याला
पाहता येतो व चित्रितही करता येतो.
मीनाक्षी अम्मन सुन्दरेश्वर विवाह सोहळा या मंदिराच्या व तसेच परिसरातील इतरही अनेक मंदिरांच्या गोपुरावर शिल्पित केलेला आपल्याला आढळून येतो.
टीप – या लेखासोबत असलेली मंदिराच्या आतील भागातील छायाचित्रे “Madurai Through The Ages” या पुस्तकातून घेतली आहेत.
गजेंद्र मोक्ष शिल्प-Gajendra Moksh Sculpture
हळेबिडूच्या होयसळेश्वर मंदिरातील गजेंद्र मोक्षाचे भन्नाट शिल्प
Gajendra Moksha is a story from the 8th Skandha of Bhagavatha Purana. An elephant named Gajendra, who was a leader of group of Elephants, gets caught by a Crocodile while drinking Water of a Pond. When nothing works, he prays to Vishnu for help. Gajendra offers a lotus flower with his trunk while making prayers. Vishnu is pleased and appears in front of him to save Gajendra. He kills the crocodile, who is actually a Gandharv name “HuHu” liberating both the Crocodile and Gajendra from the cycle of birth and death.
हळेबिडूच्या होयसळेश्वर मंदिराच्या बाह्यभागावर कोरलेल्या असंख्य शिल्पकृतीमंध्ये गजेंद्र मोक्ष ही भागवत पुराणातील ८ व्या स्कंधात येणारी विष्णूंच्या भक्तवत्सलपणाची कथादेखील उत्कृष्टपणे कोरली आहे. यात भगवान विष्णू गरुडावर बसून, गजेंद्र या हत्तीला मगरीच्या तावडीपासून वाचवण्यासाठी पृथ्वीवर आले, आणि श्रीविष्णूंच्या मदतीने, गजेंद्राला मोक्ष मिळाला हे अप्रतिम शिल्पातून दर्शविले आहे.
एकेकाळी
गजेंद्र नावाचा हत्ती वरुणाने निर्माण केलेल्या ऋतुमत नावाच्या उद्यानात
राहत होता. हे उद्यान त्रिकुट पर्वतावर होते. हा गजेंद्र त्याच्या कळपाचा
प्रमुख होता. एके दिवशी नेहमीप्रमाणे तो जलक्रीडा करण्यासाठी व त्यानंतर
विष्णूची प्रार्थना करण्यासाठी कमळाची फुले घेण्यासाठी जवळच्या तलावावर
गेला. अचानक तलावात राहणाऱ्या मगरीने गजेंद्रावर हल्ला केला आणि त्याचा पाय
पकडला. गजेंद्रने मगरीच्या तावडीतून सुटण्याचा बराच वेळ प्रयत्न केला.
त्याचा सर्व कळप, नातेवाईक आणि मित्र त्याला मदत करण्यासाठी आजूबाजूला
जमले, पण व्यर्थ. मगर त्याला सहजासहजी सोडणार नाही व म्हणूनच गजेंद्राचा
अंत जवळ आल्याचे लक्षात येताच त्याच्या कळपातील साथीदारांनी त्याला एकटे
सोडले. तो वेदनांनी कळवळत आर्ततेने विव्हळू लागला आणि जेव्हा त्याला आपला
अंत जवळ आल्याची जाणीव झाली तेव्हा गजेंद्राने त्याच्या दैवताला, भगवान
विष्णूला, त्याला वाचवण्यासाठी आर्त साद घातली.
आपल्या भक्ताची साद ऐकून विष्णू घटनास्थळी धावले. देव येताना दिसताच गजेंद्राने आपल्या सोंडेने कमळ उचलले. हे पाहून विष्णू प्रसन्न झाले आणि त्यांनी आपल्या सुदर्शन चक्राने मगरीचे पोट फाडले. गजेंद्राने विष्णूंना साष्टांग नमस्कार केला. त्यावेळी श्रीविष्णुंनी गजेंद्राला आठवण करून दिली की तो, त्याच्या मागील एका जन्मामध्ये, प्रसिद्ध पांड्य राजा इंद्रद्युम्न होता. हा राजा विष्णूचा परम भक्त होता, परंतु महर्षी अगस्त्यांचा अनादर केल्यामुळे, त्याला हत्तीच्या रूपात पुनर्जन्म घेण्याचा शाप मिळाला होता. राजा इंद्रद्युम्न हा विष्णूचा भक्त असल्याने त्याला गजेंद्र म्हणून जन्म मिळाला व इंद्रद्युम्न जेव्हा (गजेंद्र म्हणून) विष्णूला पूर्णपणे शरण जाईल तेव्हा त्याला मोक्षप्राप्ती होईल असा त्याला उशाप मिळाला होता.याचप्रमाणे मगर रूपातून भगवान विष्णूच्या सुदर्शन चक्रामुळे मुक्ती मिळालेला “हुहू” नावाचा गंधर्व होता.
हळेबिडूच्या या गजेंद्रमोक्षाच्या शिल्पामध्ये गरुडावर बसून येणारे भगवान विष्णू, गजेंद्राने त्यांच्या स्वागतासाठी सोंडेने उंचावलेले कमलपुष्प व मगर रूपातून मुक्त होणारा “हुहू” गंधर्व, पाण्यातील मासे,कासव व त्या तळ्यातील कमलपुष्पे इतके सगळे बारकावे दर्शविले आहेत.
याप्रसंगी गजेंद्राने केलेली भगवान विष्णूंची प्रार्थना गजेंद्र स्तुती नावाचे प्रसिद्ध स्तोत्र बनले.
वामनावतार व त्रिविक्रम (Waman Avatar & Trivikram)
ओणम हा केरळचा कापणीच्या हंगामाचा सण (Harvesting Festival), “बळी” या केरळच्या लोकप्रिय राजाचे या सुमारास राज्यात पुनरागमन होते म्हणून त्याचे जोरदार आगतस्वागत करण्यासाठी हा सण साजरा केला जातो.

पुढे बळीने दिग्विजयासाठी यज्ञ करायचे ठरविल्यावर आदितीच्या पोटी जन्मलेल्या भगवंतांनी याच यज्ञात “बालबटू” म्हणून जायचे ठरविले. हाच तो “वामनावतार”, ज्याचा उद्देश बळीचे राज्य त्याच्याकडून हिरावून घेऊन त्यातील स्वर्ग राज्याचा भाग इंद्रादी देवांना परत करणे हा होता. याचक म्हणून यज्ञस्थळी दाखल झालेल्या वामनाला बळीने प्रसन्न होत हवे ते दान मागण्यास सांगितले. तेव्हा मोठ्या चतुराईने त्याने अवघी तीन पावले राहतील एवढी भूमी मागितली. त्याच्या या मागणीने बळी आश्चर्यचकित झाला. पण दैत्यगुरू शुक्राचार्यांनी वामनाचे खरे स्वरूप व कावा ओळखला आणि बळीला हे दानाचे उदक वामनाच्या हातावर न सोडण्याची विनंती केली.

पण सत्यवचनी बळी त्याला तयार झाला नाही. त्याने जसे हे उदक सोडण्याची तयारी केली तसतसा वामनाचा आकार वाढू लागला, व तो त्रिविक्रम रूपात परिवर्तित झाला. पहिल्या पावलाने त्याने सकाळ पृथ्वी पादाक्रांत केली तर दुसऱ्याने स्वर्ग. आता प्रश्न होता तिसरे पाऊल कुठे ठेवायचे याचा. अशा वेळी बळीने नतमस्तक होत स्वतःचे शीर पुढे केले व त्यावर आपले तिसरे पाऊल ठेवावे असे त्रिविक्रमाला सुचविले. यामुळे बळी “सूतल” नावाच्या पाताळात ढकलला जाणार होता त्यावेळी त्याने आपल्या प्रजेवर आपले व प्रजेचंही आपल्यावर आत्यंतिक प्रेम असल्याने दरवर्षी एकवेळ आपल्या प्रजेला भेटण्यासाठी पाताळातून येऊन द्यावे अशी विनंती त्रिविक्रमाला केली. असा हा लोकप्रिय बळी राजा कापणीच्या हंगामाच्या वेळी प्रजेला भेटण्यासाठी दरवर्षी येतो म्हणून केरळवासी हा सण “ओणम” या नावाने दरवर्षी साजरा करतात.
या बळी राजाला सप्तचिरंजीवींमध्ये देखील स्थान मिळालेले आहे. बळीने अत्यंत न्यायाने राज्य चालविले. कार्तिक शु. प्रतिपदा ही त्याच्या स्मृतिप्रीत्यर्थ बलिप्रतिपदा म्हणून साजरी केली जाते. हा विक्रम संवताचा प्रारंभदिन असून हिंदूंच्या साडे तीन शुभ मुहूर्तांपैकी हा अर्धा शुभ मुहूर्त मानला जातो.

बेलूर, हळेबिडू, हंपी, बदामी या ठिकाणी फिरताना आपल्याला वामनावतार व त्रिविक्रमाची सुंदर शिल्पे अनेक ठिकाणी आढळून येतात. यातील वामनाचे बटू स्वरूप व त्रिविक्रमाचे भव्य स्वरूप आपल्याला आकर्षित करते. याच शिल्पात काही ठिकाणी बळीला अडविणारे शुक्राचार्य, त्रिविक्रमाचे पादप्रक्षालन करणारे ब्रह्मदेव, पाताळात पडणारा बळी अशी विविध चित्रीकरणे आढळून येतात.
बेलूरच्या चेन्नकेशव मंदिरावरील शिलाबालिका Belur Shilabalika at Chennakeshav Temple
The Shilabalikas or Madanikars carved at the Chennakeshav Temple of Belur are a marvel of art of Sculpture. Few of these Shilabalika are described here.
बेलूरच्या चेन्नकेशव मंदिरातील दर्पण सुंदरी

बेलूरच्या चेन्नकेशव मंदिराच्या पूर्व प्रवेशद्वाराच्या डाव्या छताकडच्या बाजूची ही प्रथम सुंदरी. नखशिखांत नटलेली व स्वतःचा हा साज शृंगार परिपूर्ण आहे की नाही ते आरश्यात न्याहाळणारी. शिल्पकाराने ही मूर्ती घडविताना जीव ओतलाय व ती प्रमाणबद्ध व जिवंत केलीय. तिची केशभूषा, दाग दागिने यातील बारकावे न्याहाळत राहावे असे वाटते. बारीकसारीक नक्षीकाम केलेली शिरोभूषणे, कर्णभूषणे, रुळणाऱ्या माळा, बाजूबंद, बांगड्या, पादभूषणे, तिची आरसा पकडण्याची पद्धत, तिच्या सळाळणाऱ्या वस्त्रांचे रेखाटन सारेच कसे अप्रतिम. थोडंसं बारकाईनं झूम करून पाहिलं तर तिच्या हाताची वाढलेली नखं व तिच्या पायातील जोडवीदेखील स्पष्ट दिसतात. आणि तिच्या पाठीमागची प्रभावळ देखील अगदी भरगच्च आहे. मूर्तीच्या चेहऱ्यावरील भाव विरहाचे असल्याचे जाणवते. इतका साजशृंगार करूनदेखील अजून आपला पती आपल्या भेटीला न आल्याचा विरह व खिन्नता तिच्या चेहऱ्यावर दिसून येते.

तिच्याबरोबर असणारी तिच्या उजवीकडची सेविका एका मर्कटाला कडेवर घेऊन आहे व हातातील द्राक्षांचा घड केवळ दाखवीत आहे. ती द्राक्ष न मिळाल्याने ते मर्कट आपलीच बोटे तोंडात घालू पहात असल्याचे देखील शिल्पकाराने कुशलतेने दर्शविले आहे. या दर्पण सुंदरीच्या सळाळणाऱ्या वस्त्राचा काही भाग त्या मर्कटाच्या चेहऱ्यावर आल्याचा बारकावादेखील शिल्पकाराने चित्रित केला आहे.
बेलूर मंदिरावरील लेखांमध्ये व पुस्तकांमध्ये हे छायाचित्र हमखास आढळून येते . भारतात इतरत्र आढळणाऱ्या दर्पणसुंदऱ्यांपेक्षा ही मूर्ती बरीच वेगळी, सुबक आणि मोहक आहे.
शुकभाषिणी
बेलूरच्या चेन्नकेशव मंदिराच्या पूर्व प्रवेशद्वारावर दर्पणसुंदरीच्या शेजारी असणारी, शुकाशी गुजगोष्टी

करणारी ही शिलाबालिका अतिशय सहजपणे नृत्यमुद्रेत उभी आहे. तिच्या अंगावरील वस्त्रे व दागिने ठसठशीत आहेत. तिचा उजवा हात मात्र सध्या मनगटापासून तुटलेला आहे, पण डावा हात पूर्ण असून त्यावर बसलेल्या शुकाशी ती संभाषण करीत जणू आपला निरोप त्या शुकाला आपल्या प्रियजनांकडे पोहोचवायला सांगत आहे.
या शिलाबालिकेच्या पाठीमागची प्रभावळ, तिची केशभूषा, कर्णभूषणे, गळ्यातील दागिने तिच्या भृकुटी यांचे कोरीव काम लक्षणीय आहे. तिच्या पायाशी उभ्या असलेल्या दासींची केशरचना देखील सुंदर असून त्या तिच्याकरिता द्राक्षे व कणस घेऊन उभ्या आहेत असे दिसते.
वसंत सुंदरी

या शिलाबालिकेच्या उजव्या हातात पिचकारी असावी पण आता हा हात तुटलेला आहे. तिच्या डाव्या हातात विड्याची पाने आहेत व तिच्यासोबत असलेल्या दोन सख्यांपैकी एक तिला बादलीतील पाण्याने पिचकारी भरून देतेय तर दुसरी पाणी. या शिल्पावरून एक शंका येते कि पिचकारीच्या प्रकारातील पाण्याचा पम्प ही इतकी जुनी संकल्पना होती का ?
हीच्या पाठीमागील प्रभावळ , अंगावरील मला, वेशभूषा यातही अनेक बारकावे दिसतात. डाव्या हातातील पाने, हातांवरून ओघळणारे वस्त्र, याचबरोबर हीच्या पायांशी बहुधा शिल्पकाराने नाव देखील जुन्या कन्नड लिपीत कोरलेले आढळते व ते चिक्का हमपा असे असल्याचे सांगण्यात येते.
शुक वाणी सुंदरी

या सुंदरीच्या उजव्या हातावर एक शुक बसलेला आहे तर डाव्या हात विड्याची पाने आहेत. हीचे अजून एक वैशिष्टय म्हणजे हिच्या हातातील बांगड्या, ज्यातील आकाराने मोठ्या बांगड्या (कंकण) हाताच्या स्थितीनुसार उतरलेल्या दाखविल्या आहेत. तिच्या डाव्या हाताला असलेल्या दासीने तर आधुनिक वस्त्रेच परिधान केली आहेत असेच म्हणायला हवे. जी सध्याच्या बर्मुडा प्रकारात मोडतील अशी आहेत.
कोटी कुपीते अथवा मर्कट सुंदरी

ही शिलाबालिका तिला सतावणाऱ्या मर्कटामुळे त्रस्त आहे. कारण तो मर्कट तिचे वस्त्र ओढायचा प्रयत्न करतो आहे. त्याला हाकलण्यासाठी तिने झाडाची एक फांदी तोडून त्याच्यावर उगारलेली आहे. आणि तो मर्कटही पहा. त्याच्या उघड्या तोंडातील दातदेखील शिल्पकाराने खुबीने दर्शविले आहेत.
या सुंदरीचा केशसंभार देखील अगदी वेगळ्या प्रकारे म्हणजे शंखाच्या आकारात बांधलेला आहे पण त्याचबरोबर तिच्या केशसंभाराच्या टोकांशी जमलेले पाण्याचे बिंदू देखील शिल्पकाराने दर्शविले आहेत व या शिल्पाखाली देखील शिल्पकाराने नाव रेखाटलेले आहे
बेलूरचे चेन्नकेशव मंदिर Chennakeshav Belur
बेलूर येथील चेन्नकेशव मंदिर हे आम्ही आजवर पाहिलेल्या मंदिरातील सर्वोत्कृष्ट मंदिर. हे होयसळ
वास्तुकलेचे प्रतीक आहे. या मंदिराचे वैशिष्ट्य म्हणजे या मंदिराच्या
बाह्य भागावर असंख्य मूर्ती कोरलेल्या आहेत. यात रामायण, महाभारत व विविध
पुराणातील कथा दर्शविणाऱ्या मूर्त्यांची रेलचेल आहे. पण हे मंदिर प्रसिद्ध
आहे ते त्याच्या छताजवळील भागावर कोरलेल्या उत्कृष्ट नर्तक / नर्तिका
यांच्या मूर्त्यांसाठी. याना शिला बालिका, मदनिका अथवा सुरसुंदऱ्या म्हणता
येईल. या मंदिरात असलेल्या एकूण अशा ४२ (बाहेर ३८ व आत ४) उत्कृष्ट कलाकृती
आपले लक्ष छताकडे वेधून घेतात. या आकृत्यांच्या कोरीव कामात होयसाळ
राजघराण्याच्या शिल्पकलेतील उच्च दर्जाची परिपूर्णता आपण पाहू शकतो. या
सुंदर छतावरील शिल्पकृती एका विशिष्ट प्रकारच्या दगडात कोरलेल्या आहेत,
ज्याला स्थानिक भाषेत बालापद कल्लू (सोपस्टोन) म्हणतात
. या कोरीव कामासाठी वापरलेले हे दगड सुरुवातीला मऊ असतात आणि नंतर वातावरणाच्या प्रभावामुळे ते कठीण होतात. या आकृत्यांची उंची सुमारे अडीच फूट आहे.
या उत्कृष्ठ आणि मोहक मदनिकापैकी काही विष्णूच्या विशिष्ट स्त्री रूपाशी मिळतीजुळती आहेत, येथेच आपल्याला भस्मासुराचा नाशासाठी विष्णूने घेतलेले मोहिनीरूपही दिसते. काही मूर्त्या या विष्णूवर्धन राजाची राणी शांतलादेवी यांच्यावरून प्रेरित असल्याचे सांगण्यात येते. या शिलाबालिका विविध नृत्यासनांमध्ये कोरलेल्या आहेत, ज्यात त्यांची वेषभूषा, नृत्य, गायन, सोबतच्या सेविका, प्राणी इ. म्हणजे त्या काळातील तज्ञ शिल्पकारांनी तयार केलेली उत्कृष्ट शिल्पे आहेत.”
या आकृत्या मंदिरासभोवताली छताच्या उंचीवर ४५ अंशाच्या कोनात आढळतात. यातील मुख्य प्रतिमा उभ्या स्थितीत असते तर त्या मूर्तीच्या प्रभावळीत तळाशी सहाय्यक कलाकार, प्राणी आणि सेविकांच्या लहान मूर्ती आढळतात.
या सर्व मुर्त्यांच्या हातातील बांगड्या, आर्मलेट, ब्रेसलेट, कानातले रिंग, हार, कंबरपट्टा, अलंकारिक स्कर्ट्स. पायातील दागिने, पैंजण, पायाच्या अंगठ्या आणि खांदे, हातांचे दागिने यांसारख्या दागिन्यांच्या उत्कृष्ट कोरीव कामाने सुशोभित केलेले आहेत. कुशलतेने कोरीव काम करून, या सुरसुंदरींच्या शिल्पकारांनी त्या काळात अस्तित्वात असलेल्या आधुनिक फॅशनचे प्रदर्शन केले आहे, असेच म्हणावे लागते व त्यामुळे मंदिर पाहताना , या मूर्त्या पाहताना त्यांच्या प्रभावळीकडे तसेच त्यांच्या अलंकारांकडे देखील बारकाईने पाहणे आवश्यक ठरते.
मंदिराच्या बा
हेरील
भागावर जी इतर असंख्य सुंदर शिल्पे आहेत यात विष्णूची , शिवाची विविध रुपे
, अवतार व त्यांच्या कथा आपल्याला पाहायला मिळतात. काही शिल्पे कशी बनवली
असतील याचाही अचंबा वाटतो. रामायण महाभारतातील अनेक प्रसंग देखील आपल्याला
येथे आढळतात.
या मंदिराच्या बाह्य भागावरील मुर्त्यांची माहिती हिंदीतून करून घेण्यासाठी पुढील विडिओ पहा.
बेलूर का चेन्नकेशव मंदिर
शिल्पांकन में आलिंगन भेद - वृक्षाधिरूढकम
शिल्पकार शास्त्र विधान के अनुसार प्रतिमाओं का निर्माण करते थे। शिल्प को देखने के बाद यदि उसे शास्त्रों में ढूंढा जाए तो उसका मूल मिल जाएगा।
जैसे पहले पटकथा लिखी जाती है और उसके बाद उसका फ़िल्मांकन किया जाता है ठीक वैसे ही शास्त्रों से विषय लिए जाते थे फ़िर उनका शिल्पांकन किया जाता है।
![]() |
| आलिंगन भेद - वृक्षाधिरूढकम |
कहते हैं कि (तत्रासमागतयोः प्रीति लिंग द्योतनार्थमालिंगन चतुष्टयम्।स्पृष्टकम्, विद्धकम, उदधृष्टकम, प्रीडितकम्, इति।।) प्रेम को प्रकट करने के लिए स्पृष्टकम, विद्धकम, उदधृष्टकम, प्रीडितकम आदि चार तरह का आलिंगन होता है।
प्रदर्शित प्रतिमा शिल्प में आचार्य वाभ्रवीय द्वारा बताए गए आलिंगन के एक प्रकार "वृक्षाधिरुढ़कम" का प्रयोग किया गया है।
इस आलिंगन के प्रकार को विस्तार देते हुए कहते हैं - चरणेन चरणामाक्रम्य द्वितीयेनोरुदेशामाक्रमन्ती वेष्टयन्ती वातत्पृष्ठ सक्तैक बाहुद्विती येनां समवनमयन्ती ईषन्मन्द सीत्कृत कूजिता चुम्बनार्थ मेवाधिरोढुमिच्छेदिति वृक्षाधिरूढकम्।।
वृक्षाधिरूढकम - जिस तरह से पेड़ पर चढ़ते हैं उसी तरह वृक्षाधिरूढकम आलिंगन में स्त्री अपने एक पैर से पुरुष के पैर को दबाती हैं और अपने दूसरे पैर से पुरुष के दूसरे पैर को पूरी तरह से लपेट लेती हैं।
इसके साथ ही अपने एक हाथ को पुरुष की पीठ पर रखकर दूसरे हाथ से उसके कंधे तथा गर्दन को नीचे की तरफ झुकाती हैं और फिर धीरे-धीरे से पुरुष को चूमने लगती हैं और उस पर चढ़ने की कोशिश करती हैं।
इस आलिंगन को वृक्षाधिरूढकम आलिंगन कहा जाता है। इस तरह मंदिरों विहारों की भित्तियों पर अनेक शिल्पांकन प्राप्त होते हैं। काम कला की शिक्षा देने के उद्देश्य से इनका शिल्पांकन प्रमुख स्थान पर किया जाता था
आरंग का भांड देऊल जैन मंदिर
सरगुजा के रामगढ़ की गुफ़ा जोगीमाड़ा के भित्ति चित्रों से लेकर बस्तर तक जैन उपस्थिति दर्ज होती है। चित्र में दिखाया गया मंदिर रायपुर सम्बलपुर मार्ग पर 37 वें किमी पर रायपुर जिला स्थित आरंग तहसील का 11 वीं सदी निर्मित "भांड देऊल" मंदिर का है।
![]() |
| भांड देवल मंदिर आरंग |
![]() |
| जैन तीर्थंकर श्रेयांशनाथ, शांतिनाथ एवं अनंतनाथ |
आरंग में पारदर्शी स्फ़टिक प्रस्तर की तीन पद्मासन तीर्थंकरों की प्रतिमाएं चांदी के सिंहासन पर स्थापित प्राप्त हुई हैं जो रायपुर के दिगम्बर जैन मंदिर में स्थापित हैं। उन्हें देखने का अवसर मुझे प्राप्त हुआ है। इन प्रतिमाओं का निर्माण कुशल शिल्पी के द्वारा हुआ प्रतीत होता है।
![]() |
| मिथुनांकन |
किंवदन्तियों में इसे मोरध्वज की नगरी भी कहा जाता है। लोकगीतों में गाये जाने वाली प्रेम कहानी "लोरिक चंदा" का गृह भी आरंग को माना जाता है। जबकि यह प्रेम कहानी प्रदेश की सीमाओं से बाहर अन्य प्रदेशों में गाई जाती है। इस तरह प्राचीन काल में आरंग एक महत्वपूर्ण नगर एवं राजर्षितुल्य कुल की राजधानी रहा है
मांग भरने की प्रथा के प्राचीन प्रमाण
वाण वंश के राजा विक्रमादित्य द्वारा 870-900 ईंस्वीं में निर्मित पाली जिला कोरबा छत्तीसगढ़ के शिवालय में करदर्पण देख कर मांग में सिंदूर भरती विवाहित स्त्री का मनोहर शिल्पांकन किया गया है।
इससे यह प्रमाण मिलता है कि उस काल में माँग भरने का प्रचलन था। वैसे तो वैदिक काल से विवाहित स्त्रियों को मांग में सिंदूर भरना अनिवार्य था।
![]() |
| पाली का शिवालय और मांग भरती स्त्री |
यह अत्यंत संवेदनशील भी होती है। यह मांग के स्थान यानी कपाल के अंत से लेकर सिर के मध्य तक होती है। सिंदूर इसलिए लगाया जाता है क्योंकि इसमें पारा नाम की धातु होती है।
पारा ब्रह्मरंध्र के लिए औषधि का काम करता है। महिलाओं को तनाव से दूर रखता है और मस्तिष्क हमेशा चैतन्य अवस्था में रखता है।
विवाह के बाद ही मांग इसलिए भरी जाती है क्योंकि विवाहके बाद जब गृहस्थी का दबाव महिला पर आता है तो उसे तनाव, चिंता और अनिद्रा जैसी बीमारिया आमतौर पर घेर लेती हैं।
पारा एकमात्र ऐसी धातु है जो तरल रूप में रहती है। यह मष्तिष्क के लिए लाभकारी है, इस कारण सिंदूर मांग में भरा जाता है।
ज्ञात हो कि 10 वीं 11 वीं शताब्दी में इस शिवालय का जीर्णोद्धार कलचुरी शासक जाज्ल्लदेव ने कराया था।
प्राचीन प्रतिमा शिल्प में स्वर्ग की अप्सरा अंजना : खजुराहो
खजुराहो के प्रतिमा शिल्प में शूल निवारण अंकन
खजुराहो के मंदिर अनुपम का शिल्प : सद्यस्नाता
मोबाइल का अविष्कार चौदहवीं शताब्दी में
![]() |
| मोबाईल पर बात करती स्त्री |
प्राचीन मंदिर की भित्ति में सांप एवं नेवले की लड़ाई का अंकन
![]() |
| नारायणपुर (कसडोल-छत्तीसगढ़) के मंदिर की भित्ति में सांप एवं नेवले की लड़ाई का खूबसूरत अंकन |
खजुराहो की प्रतिमाओं में खुजली प्रदर्शन
प्राचीन शिल्प में वाद्ययंत्र एवं नृत्य : खजुराहो
![]() |
| मुरली वादन… लक्ष्मण मंदिर खजुराहो |
![]() |
| आलाप… लक्ष्मण मंदिर खजुराहो |
![]() |
| नृत्य गणपति लक्ष्मण मंदिर खजुराहो |
![]() |
| मृदंग वादन लक्ष्मण मंदिर खजुराहो |
![]() |
| ड्रम वादन लक्ष्मण मंदिर खजुराहो |
स्थापत्य एवं शिल्प के विषयों में बदलाव
![]() |
![]() |
| लक्ष्मण मंदिर खजुराहो के नृत्य गणपति प्रतिमा में अंकित ड्रम वादक |
![]() |
| दंतेश्वरी मंदिर दंतेवाड़ा बस्तर का चौदहवीं सदी का प्रतिमा शिल्प |
![]() |
| सद्यनिर्मित अमकंटक के जैन मंदिर का प्रतिमा शिल्प |
शैव एवं वैष्णव सम्प्रदाय के मिलन का प्रतीक : हरिहर
![]() |
| शैव एवं वैष्णव सम्प्रदाय के मिलन का प्रतीक संघाट नंदी एवं गज विट्ठल मंदिर हम्पी कर्णाटक |
![]() |
| हरिहर की संघाट प्रतिमा छत्तीसगढ़ पाली नवमी शताब्दी |
![]() |
| सपरिवार हरिहर मिलन राजा रवि वर्मा का चित्र |
![]() |
| हनुमान द्वारा शिवार्चन फ़णीकेश्वर महादेव फ़िंगेश्वर छत्तीसगढ़ परवर्ती काल |
नारायणपुर के मंदिर की भित्ति में सांप एवं नेवले की लड़ाई
![]() |
| नारायणपुर (कसडोल-छत्तीसगढ़) के मंदिर की भित्ति में सांप एवं नेवले की लड़ाई |
प्रतिमा शिल्प में बुद्ध की विभिन्न मुद्राएं
![]() |
| भूमि स्पर्श मुद्रा बुद्ध, राजिम छत्तीसगढ़ |
![]() |
| भूमि स्पर्श मुद्रा थिम्पू भूटान |
![]() |
| अभय मुद्रा, धौली भुवनेश्वर उड़ीसा |
![]() |
| धम्म चक्र परवर्तन मुद्रा- धौली भुवनेश्वर उड़ीसा |
![]() |
| पद्मासन ध्यान मुद्रा- सिरपुर छत्तीसगढ़ |
![]() |
| वज्र मुद्रा- कान्धार शैली |
प्राचीन काल के प्रतिमा शिल्प में आभूषण अलंकरण
![]() |
| पायल धारिणी (राजा रानी मंदिर भुवनेश्वर उड़ीसा) फ़ोटो ललित शर्मा |
![]() |
| संध्या काल ( सूर्य मंदिर कोणार्क उड़ीसा) फ़ोटो ललित शर्मा |
![]() |
| संध्या काल ( शिवालय देवर बीजा, जिला बेमेतरा छत्तीसगढ़) फ़ोटो ललित शर्मा |
![]() |
| नर्तकी (गणेश मंदिर हम्पी कर्नाटक) फ़ोटो ललित शर्मा |
![]() |
| कलश धारिणी देवी (जराय का मठ बरुआ सागर उत्तर प्रदेश) फ़ोटो ललित शर्मा |
![]() |
| नदी देवी गंगा ( देऊर मंदिर मल्हार जिला बिलासपुर छत्तीसगढ़) फ़ोटो ललित शर्मा |
![]() |
| शाल भंजिका ( मुक्तेशर मंदिर समूह भुवनेश्वर उड़ीसा) फ़ोटो ललित शर्मा |
![]() |
| चंवर धारिणी ( विट्ठल मंदिर हम्पी कर्नाटक) फ़ोटो ललित शर्मा |
![]() |
| क्षीर सागर में शेष शैया पर भगवान विष्णु एवं देवी लक्ष्मी (लक्ष्मीनारायण मंदिर ओरछा) फ़ोटो ललित शर्मा |
मानव का पक्षी प्रेम एवं शुक सारिका प्रसंग
![]() |
| शुक सारिका खजुराहो |
![]() |
| मुक्तेश्वर मंदिर समूह भुबनेश्वर की शुक सारिका |
![]() |
| मुक्तेश्वर मंदिर समूह भुबनेश्वर में लेखक |
प्राचीन भारतीय मूर्तिकला में केश विन्यास एवं अलंकरण
![]() |
| क्या मुखड़ा देखे दर्पण में…… सर्वांग अलंकृत स्त्री - राजा रानी मंदिर भुबनेश्वर उड़ीसा। |
![]() |
| चित्र में दाढी एवं मूंछ युक्त पुरुष ने जूड़ा बांधकर उसे पुष्पादि से अलंकृत किया है। चित्र - खजुराहो। |
![]() |
| पुष्पादि एवं मैन से अलंकृत केश - खजुराहो |
![]() |
| कोणार्क की भित्ति में स्थापित पुरुष प्रतिमा का केश विन्यास |
![]() |
| सर्वांग सुंदर अलंकरण का पार्श्व - खजुराहो |
प्राचीन प्रतिमा शिल्प में आखेट अंकन
![]() |
| हजारा राम मंदिर हम्पी कर्नाटक की भित्ति में हिरण के शिकार का दृश्य |
![]() |
| हजारा राम मंदिर हम्पी कर्नाटक की भित्ति में अंकित शुकर शिकार का दृश्य। |
![]() |
| विश्वनाथ मंदिर खज्रुराहो की भित्ति में अंकित हिरण के शिकार का दृश्य। |
![]() |
| स्वान सहित दो लोग मिलकर एक बड़े शुकर का शिकार कर रहे हैं। |
![]() |
| विरुपाक्ष मंदिर हम्पी कर्णाटक की भित्ति में शेर को हिरणो का शिकार करते दिखाया गया है। |
प्राचीन प्रतिमा शिल्प में अंकित तत्कालीन स्त्री मनोविनोद
![]() |
| कंदुक क्रीड़ा कर मनोविनोद करती त्रिभंगी मुद्रा में नायिका : खजुराहो |
![]() |
| मुक्तेश्वर मंदिर भुवनेश्वर की भित्ति में अंकित कंदुक क्रीड़ा कर मनोविनोद करती नायिका। |
![]() |
| राधा कृष्ण के नवीन प्रतिमा शिल्प में राधा के कलश में चोंच डालकर जल ग्रहण करता हुआ मयूर। |
![]() |
| खजुराहो के कंदारिया महादेव के भित्ति में मनोविनोद एवं अंत:पुर के साथी के रुप में हंस। स्द्यस्नाता स्त्री के केशों से टपकती हुई जल की बूंदों को मोती समझ कर ग्रहण करता हुआ। |
![]() |
| उड़ीसा के नवीन प्रतिमा शिल्प में सारिका को चुग्गा चुगाते हुए नायिका। |
![]() |
| राजा रानी मंदिर भुवनेश्वर के प्रतिमा शिल्प में सुग्गे के साथ मनोविनोदरत नायिका। |
![]() |
| मुक्तेश्वर महादेव भुवनेश्वर की भित्ति में अंकित वीणावादिनी |
![]() |
| राजा रानी मंदिर भुवनेश्वर की भित्ति में अंकित शाल भंजिका अशोक वृक्ष पर पाद प्रहार करते हुए। तत्कालीन समय में यह धारणा भी कि नायिका के बाएँ चरण प्रहार के बिना अशोक वृक्ष पुष्पित नहीं होगा |
प्राचीन काल के शिल्प में शय्या/खाट अंकन
![]() |
| खजुराहो के लक्ष्मण मंदिर की भित्ति शिल्पांकन में शय्या। |
![]() |
| कोणार्क के सूर्य मंदिर की भित्ति में शय्या एवं मच्छरदानी अंकन |
![]() |
| गंडई छत्तीसगढ़ के प्राचीन मंदिर में शय्यारत स्त्री का शिल्पांकन। |
मल्हार की मौर्यकालीन अद्भुत विष्णु प्रतिमा
![]() |
| मल्हार की मौर्यकालीन अद्भुत विष्णु प्रतिमा |
पुरातात्विक दृष्टि से मल्हार महत्वपूर्ण स्थान है। यहाँ कई एकड़ में फ़ैला हुआ मृदा भित्ति दुर्ग भी है। मल्हार के मृदा भित्ती दुर्ग (मड फ़ोर्ट) सर्वप्रथम जिक्र जे. डी. बेगलर ने 1873-74 के अपने भ्रमण के दौरान किया। परन्तु उन्होने इस मड फ़ोर्ट में विशेष रुचि नहीं दिखाई। उन्होने इस शहर में मंदिरों के 2 खंडहरों का जिक्र किया।
के. डी. बाजपेयी मानते हैं कि पुराणों में वर्णित मल्लासुर दानव का संहार शिव ने किया था। इसके कारण उनका नाम मलारि, मल्लाल प्रचलित हुआ।
यह नगर वर्तमान में मल्हार कहलाता है। मल्हार से प्राप्त कलचुरीकालीन 1164 ईं के शिलालेख में इन नगर को मल्लाल पत्त्न कहा गया है। इस तरह यह छत्तीसगढ़ का प्रमुख पुरातात्विक स्थल है।
एक अद्भुत प्रतिमा यहाँ के संग्रहालय में है। जिसे अध्येता विष्णु की प्रतिमा बताते हैं। जिसके एक हाथ से सीधी तलवार दबाई हुई है, शीष पर टोपी और कानों में कुंडल के शीश के बगल में चक्र दिखाई देता है।
पोषाक बख्तरबंद जैसी है तथा पैरों में लम्बे जूते (गम बूट) हैं। इस प्रतिमा के नाम निर्धारण पर गत संगोष्ठी में विवाद की स्थिति उत्पन्न थी, कुछ इसे विष्णु प्रतिमा मानते हैं, कुछ नहीं।
वैसे यह प्रतिमा किसी युनानी योद्धा जैसे दिखाई देती है। यह खोज एवं अध्ययन का विषय भी है। अगर किसी ने ऐसी प्रतिमा कहीँ और देखी हो तो बताईए।
प्राचीन विश्व में सूर्यपूजा
बारसूर (बस्तर) की विनायकी प्रतिमा
प्राचीन मंदिरों के वास्तु शिल्प में नागांकन
![]() |
| राजा रानी मंदिर के द्वार पर स्थापित नागप्रहरी - भुवनेश्वर उड़ीसा |
![]() |
| राजीवलोचन मंदिर राजिम छत्तीसगढ़ के मंडप स्तंभ पर अंकित नागपाश |
![]() |
| राजीवलोचन मंदिर राजिम छत्तीसगढ़ के मंडप के द्वार शीर्ष पर शेष शैया |
![]() |
| छत्तीसगढ़ के प्राचीन नगर सिरपुर से उत्खनन में प्राप्त जैन तीर्थांकर पार्श्वनाथ की प्रतिमा |
पुरातत्व शास्त्र की वर्णमाला :मृदा भाण्ड
![]() |
| मृदाभाण्ड बनाने की तकनीक का निरीक्षण करते हुए लेखक |
![]() |
| मृदा भाण्ड पकाने की वर्तमान तकनीकि |
| उत्खनन में पाप्त मृदाभाण्ड के टुकड़े - डमरु जिला बलौदाबाजार छत्तीसगढ़ |
![]() |
| कुम्हार के आवे पर- डॉ शिवाकांत बाजपेयी, डॉ जितेन्द्र साहू एवं करुणा शंकर शुक्ला |
![]() |
| पॉटरी यार्ड - तरीघाट उत्खनन जिला दुर्ग छत्तीसगढ़ |
इतिहास की खोई हुई कुंजी है शंख लिपि
![]() |
| उदयगिरि मध्यप्रदेश |
![]() |
| शंख लिपि उदयगिरि |
![]() |
| शंखलिपि सरगुजा सीता लेखनी पहाड़ |
सोलह शृंगार: कल और आज
![]() |
| यक्षणी - सिरपुर |
![]() |
| मुख दर्शना (तेवर) जबलपुर |
![]() |
| परिचारिका द्वार शाखा पातालेश्वर मंदिर मल्हार |
![]() |
| परिचारिका द्वार शाखा पातालेश्वर मंदिर मल्हार |
![]() |
| करधन घारिणी परिचारिका सिरपुर |
![]() |
| सौंदर्य पेटिका धारी वनवासिनी दंतेश्वरी मंदिर दंतेवाड़ा बस्तर |
शिवालयों में कीर्तिमुख अलंकरण
![]() |
| कीर्तिमुख (भीमा-कीचक) मल्हार छत्तीसगढ़ |
![]() |
| कीर्तिमुख (ताला) छत्तीसगढ़ |
![]() |
| कीर्तिमुख पंचायतन शिवालय सुरंग टीला सिरपुर छत्तीसगढ़ |
![]() |
| कीर्तिमुख कंसुवा शिवालय कोटा (फ़ोटो - रिंकेश अग्रवाल कोटा) |
कुंआ: मानव सभ्यता की पहचान
![]() |
| हड़प्पाकालीन नगर लोथल (गुजरात) के कुंए का निरीक्षण करते हुए विनोद गुप्ता जी के साथ |
![]() |
| सिरपुर के बाजार क्षेत्र के मध्य कुंआ |
![]() |
| सिरपुर के प्राचीन बाजार क्षेत्र के मध्य कुंआ |
कौड़ी, तू कितने कौड़ी की?
खोपड़ी: महापाषाण कालीन सभ्यता का साक्षी
![]() |
| माला चा गोटा |
![]() |
| माला चा गोटा |
![]() |
| महापाषाण कालीन स्मारक |
![]() |
| उत्खनन कार्य |
![]() |
| उत्खनन में प्राप्त मृदाभांड के टुकड़े |
![]() |
| उत्खनन स्थल पर डॉ रेशमा सावंत, ललित शर्मा एवं किसान भाऊ |
![]() |
| डॉ कांति पवार (सहायक प्राध्यापक डेक्कन महाविद्यालय पुणे) |
सोलह शृंगार: कल और आज
![]() |
| यक्षणी - सिरपुर |
![]() |
| मुख दर्शना (तेवर) जबलपुर |
![]() |
| परिचारिका द्वार शाखा पातालेश्वर मंदिर मल्हार |
![]() |
| परिचारिका द्वार शाखा पातालेश्वर मंदिर मल्हार |
![]() |
| करधन घारिणी परिचारिका सिरपुर |
![]() |
| सौंदर्य पेटिका धारी वनवासिनी दंतेश्वरी मंदिर दंतेवाड़ा बस्तर |
शिवालयों में कीर्तिमुख अलंकरण
![]() |
| कीर्तिमुख (भीमा-कीचक) मल्हार छत्तीसगढ़ |
![]() |
| कीर्तिमुख (ताला) छत्तीसगढ़ |
![]() |
| कीर्तिमुख पंचायतन शिवालय सुरंग टीला सिरपुर छत्तीसगढ़ |
![]() |
| कीर्तिमुख कंसुवा शिवालय कोटा (फ़ोटो - रिंकेश अग्रवाल कोटा) |













































































































No comments:
Post a Comment