अप्रतिम अतुलनीय अर्धनारीश्वर (राजापुर, जि. हिंगोली)
औंढा नागनाथ जवळ राजापुर येथे तीन मुर्ती आहेत. यात सरस्वती आणि योग नरसिंह यांच्या मुर्ती आहेत. तिसरी अप्रतिम मुर्ती आहे अर्धनारीश्वराची. शिव पार्वतीची संयुक्त मुर्ती. उजव्या बाजुला शिव आहे आणि डावीकडे पार्वती. पत्नी ही नेहमी डाव्या बाजूला दाखवली जाते म्हणूनच वामांगी असा शब्द आला आहे.या शिल्पकाराचे कसब अगदी एक एक जागी आढळते. पार्वतीचा मुकुट सजलेला (करंडमुकुट) आणि शिवाचा मुकुट जटांचा. तिच्या कानात सुंदर नाजूक कुंडले तर शिवाच्या कानात सर्पाकार कुंडले. पार्वतीला हातभर काकणं, तोडे. बाजुबंद, खालच्या हातात नाजुकपणे धरलेला कमंडलू. कमरेला मेखला. कमाल म्हणजे तिच्या वस्त्रांवरची नक्षीही दाखवलेली आहे. पायात तोडे तर आहेतच पण अंगठ्या जवळच्या बोटात जोडवे पण आहेत. वरच्या हातात आरसा आहे.
शिवाच्या वरच्या हातात त्रिशुळ आहे. खालच्या हातात अक्षयमाळा आहे. बाजुबंद सर्पाकार राकट आहे. पायात रूंडमाळा दिसतात, पण हीच माळ पार्वतीच्या बाजूने नाजूक दागिना बनते. गळ्यातील माळेचेही असेच. शिवाच्या बाजूने सरळ ठाशीव दिसणारी माळ पार्वतीच्या स्तनांवरून वळण घेत कलात्मक डौलदार बनते. तिचे वार्यावर उडणारे वस्त्र आणि शिवाचे जाडे भरडे वस्त्र.
खाली शिवाचे वाहन नंदी आहे आणि पार्वतीचे सिंह न दाखवता लोध (मुंगुस किंवा घोरपड) दाखवले आहे.
महाराष्ट्रात अर्धनारीश्वराच्या मुर्ती फार थोड्या आहेत. ज्या आहेत त्या मंदिराच्या बाह्य भागावर कोरलेल्या आढळून येतात. मुख्य मुर्ती म्हणून कोरलेवी हाच एकमेव अप्रतिम नमुना.
.अत्यंत विचित्र वाहनांवर आरूढ झालेल्या देवींचे दर्शन !
सप्तमातृका
आशुतोष बापट
आपल्या पुराणांमध्ये कथांच्या माध्यमातून वेगवेगळे तत्त्वज्ञान सांगण्याचा प्रयत्न झालेला आहे. वराहपुराणदेखील सप्तमातृकांच्या माध्यमातून असेच मोठे तत्त्वज्ञान मांडते.
एखादे तत्त्वज्ञान सर्वसामान्यांना सहजगत्या समजावे म्हणून विविध पुराणांमधून कथा रचल्या गेल्या. त्या कथा एखाद्या देवतेच्या जन्माच्या किंवा एखाद्या देवतेने एखाद्या राक्षसावर मिळवलेल्या विजयाच्या असतात. बरीचशी पुराणे ही त्या त्या देवतेच्या सामर्थ्यांची वर्णने करतात. पुराणांतून काही सुंदर कथा सांगितलेल्या आहेत. सप्तमातृका ही संकल्पना मातृका, मातृदेवता इथपासून ते महादेवाला अंधकासुरवधाच्या वेळी मदत करण्यासाठी विविध देवांनी आपल्यापासून निर्माण केलेल्या शक्ती इथपर्यंत विस्तृतपणे वर्णिलेल्या दिसतात. वेगवेगळी पुराणे सप्तमातृकांबद्दल कथा सांगतात. त्यात बरीचशी सुसंगती असली तरी काही ठिकाणी विपर्यास किंवा काहीशी वेगळी कथा सांगितलेली दिसते. या सर्व पुराणांत वराहपुराण सप्तमातृकांची कथा सविस्तर सांगते. ती पुढीलप्रमाणे-
कश्यपाला दितीपासून दोन पुत्र झाले, हिरण्याक्ष आणि हिरण्यकशिपु. त्या दोन्ही असुरांना विष्णूने अनुक्रमे वराह अवतार घेऊन आणि नरसिंह अवतार घेऊन ठार मारले. हिरण्यकशिपुचा मुलगा प्रल्हाद हा तर महान विष्णुभक्त होताच. प्रल्हादाने हिरण्यकशिपु नंतर उत्तम राज्यकारभार केला आणि नंतर सर्व ऐहिक सुखांचा त्याग करून संन्यास घेतला. त्यानंतर असुरांचा राजा झालेला अंधकासुर यानेही कठोर तपश्चर्या करून ब्रह्मदेवाकडून विविध वर प्राप्त करून घेतले आणि त्यामुळे तो शक्तिशाली बनला. अर्थातच तो उन्मत्त झाला आणि सर्व देवांना त्रास देऊ लागला. देवांनी मदतीसाठी कैलासावर महादेवाकडे धाव घेतली. शंकर भगवान या सर्व देवांची तक्रार ऐकत असतानाच प्रत्यक्ष स्वत: अंधकासुर, पार्वतीचे अपहरण करण्याच्या हेतूने कैलासावर दाखल झाला. शिव तत्काळ अंधकासुराशी लढण्यासाठी सज्ज झाले. त्यांनी लगोलग वासुकी, तक्षक, आणि धनंजय या तीन नागांचा बंध आपल्या कमरेभोवती बांधला. त्याच वेळी नील नावाचा अजून एक राक्षस महादेवाला मारण्यासाठी हत्तीच्या रूपात तिथे येऊन ठेपला. शिवाचे वाहन असलेल्या नंदीला हे समजले आणि त्याने शिवाचाच अंश असलेल्या वीरभद्राला याची कल्पना दिली. वीरभद्राने सिंहाचे रूप घेतले आणि त्याने हत्तीच्या रूपातील नील राक्षसाचा वध केला. त्यानंतर त्याने हत्तीचे कातडे शिवाला भेट दिले. शिवाने ते कातडे अंगावर पांघरले आणि तो अंधकासुराशी युद्ध करण्यास सज्ज झाला. अंगावर हत्तीचे कातडे पांघरलेले, सर्पाची आभूषणे अंगावर ल्यालेली, हातात त्रिशूळ धारण करून शिव आपल्या गणांसमवेत अंधकासुराशी युद्ध करू लागला. विष्णू आणि इतर देवगण शिवाच्या साहाय्याला धावून आले. परंतु घनघोर युद्ध सुरू झाले आणि इतर देवांना तिथून पळून जावे लागले. शेवटी शिवाने आपला त्रिशूळ अंधकासुराच्या पोटात खुपसला आणि त्याला उंच उचलून घेतले.
परंतु अंधकासुराच्या अंगातून रक्ताचे थेंब गळू लागले. ते थेंब जमिनीवर पडताच त्यातून एकेक अंधकासुराच्या रूपातील राक्षस निर्माण होऊ लागला. अशा रीतीने हजारो अंधकासुर तिथे निर्माण झाले. विष्णूने आपल्या सुदर्शनचक्राने हे इतर मायावी अंधकासुरांना ठार मारले. अंधकासुराच्या अंगातून रक्ताचे आणखी थेंब जमिनीवर पडू नयेत म्हणून शिवाने आपल्या तोंडातून ज्वाळा निर्माण केल्या आणि त्या ज्वाळेतून योगेश्वरी नावाची एक शक्ती निर्माण केली. त्याबरोबर इंद्र आणि इतर देवतांनीही आपापली शक्ती निर्माण करून ती शिवाच्या मदतीला तिथे पाठवली. ब्रह्मदेवाची शक्ती ब्रह्माणी, इंद्राची शक्ती इंद्राणी/ऐन्द्री, महेशाची माहेश्वरी, कार्तिकेयाची कौमारी, विष्णूची वैष्णवी, वराहाची वाराही, आणि यमाची शक्ती चामुंडा अशा या सात शक्ती देवता तिथे उत्पन्न झाल्या. त्यांना सप्तमातृका असे संबोधले जाऊ लागले. त्या शिव आणि अंधकासुर यांच्या युद्धात मध्ये आल्या आणि त्यांनी अंधकासुराच्या अंगातून होणारा रक्तस्राव आपल्या शक्तीने थांबवला. या लढाईत शेवटी अंधकासुराची शक्ती संपत आली आणि शिवाने त्याचा पराभव केला. अशा रीतीने या सप्तमातृकांचा उदय झाला. या मातृकांच्या हातात त्या त्या देवाची आयुधे होती. तसेच त्या मातृका त्या त्या देवतांच्या वाहनांवर बसून आलेल्या होत्या.
वराहपुराणात विस्तृतपणे मांडलेली ही आहे सप्तमातृकांची कथा. विविध पुराणांमधून मातृका, त्यांचा उगम, त्यांचे कार्य याबद्दल कथा वाचायला मिळतात. त्यात वराह, विष्णू, मत्स्य, कूर्म आणि देवीपुराणाचा समावेश होतो. तसेच शिल्पशास्त्रावर आधारित असलेल्या ‘सुप्रभेदागम’ या ग्रंथातही मातृकांचा उल्लेख केलेला आहे. परंतु वराहपुराणात वर उल्लेख केलेली अगदी विस्तृत कथा पाहायला मिळते. शिवाय इतर सर्व पुराणांत या मातृकांची संख्या सात सांगितलेली असताना वराहपुराण मात्र ही संख्या आठ असल्याचे सांगते. सर्वात आधी उल्लेखिलेली योगेश्वरी ही देखील एक मातृका आहे असे वराहपुराणात म्हटलेले आहे.
अंधकासुराशी साम्य दाखवणारी अशीच एक कथा मरकडेयपुराणात येते. त्यानुसार शुंभ नावाच्या राक्षसाशी अंबिकेचे युद्ध झाले. त्या युद्धात अंबिकेला या मातृकांनी मदत केली. कारण शुंभ दैत्याला वर मिळालेला होता की त्याच्या रक्ताचा थेंब जमिनीवर पडला की त्यातून अजून एक असुर निर्माण होईल. त्याच्या रक्ताचे थेंब या मातृकांनी वरच्यावर धरून ठेवले आणि शुंभाचा निपात केला. असुराचा मोठय़ा प्रमाणावर रक्तपात झाला आणि त्यामुळे तो हतबल होऊन पराभूत झाला. अगदी शिव-अंधकासुर युद्धासारखीच ही कथा आहे. अंधकासुराची कथा पुढे वाढवली आहे ती कूर्मपुराणाने. अंधकासुराच्या वधानंतर शिवाने भरव आणि या मातृकांना पाताळलोकात जाऊन वास्तव्य करायला सांगितले. त्यानुसार त्यांनी पाताळलोकात प्रयाण केले. परंतु भरव जो शिवाचाच अंश होता तो शिवामध्ये विलीन झाला. मातृकांना आता कोणताही आधार राहिला नाही आणि त्या विध्वंसक बनल्या. त्यांनी सर्वत्र विध्वंस करायला सुरुवात केली. शेवटी भरवाने नरसिंहाला पाचारण केले आणि त्या मातृकांना शांत करण्यास सांगितले. नरसिंहाने त्या मातृकांना शांत केले आणि तेव्हापासून त्यांचे स्वरूप हे उपकारक बनले. अशा विविध पुराणांतून या सप्तमातृकांचे आगळेवेगळे पलू आपल्याला पाहायला मिळतात. परंतु सर्वत्र एक मुख्य धागा समान दिसतो की कोणा दैत्याच्या निर्मूलनासाठी विविध सात देवतांनी आपल्या शक्ती महादेवाच्या मदतीसाठी निर्माण केल्या, आणि त्या पुढे सप्तमातृका म्हणून प्रसिद्ध झाल्या. अनेक अभ्यासकांनी मातृकांचा अभ्यास करताना त्यांचे उल्लेख अगदी ऋग्वेदापासून मिळतात असेही प्रतिपादन केलेले आहे. त्यावर मतमतांतरेदेखील आहेत. पण या सप्तमातृका पुढे मूर्तीरूपात आल्या आणि त्या प्रसिद्ध झाल्या. बदामीचे चालुक्य आणि त्यांच्या नंतरचे कल्याणी चालुक्य या सप्तमातृकांचे उपासक होते. त्यांच्या मंदिरस्थापत्यात सप्तमातृका पट्ट प्रकर्षांने पाहायला मिळतात. या मातृकांची संख्या सात असली तरी काही ठिकाणी ती आठ, १६, ३२ झालेली दिसते. या सातमातृकांच्या शिवाय माहेन्द्री, नारसिंही, वैनायकी, नारायणी, अंबिका, भद्रकाली, काली, योगेश्वरी यांचे शिल्पांकनदेखील पाहायला मिळते.
शक्ती हा शब्द लिहिताना ‘ती शक्ती’ या उद्देशाने वापरला असल्यामुळे, हा शब्द स्त्रीिलगी आहे हे वाचल्यावर लगेच समजते. परंतु मूर्ती घडवताना मात्र त्यांचे नेमके स्वरूप समजण्यासाठी त्या मूर्ती स्त्रीरूपात घडवल्या जातात. आकर्षक आणि नेमक्या सप्तमातृकांच्या मूर्ती विविध मंदिरांमधून दिसतात. त्या मूर्ती कशा तयार कराव्यात याचे काही एक शास्त्र आहे. शिल्पशास्त्राची माहिती देणाऱ्या विविध आगम ग्रंथांमधून या सप्तमातृकांच्या मूर्ती, त्यांची ठेवण, त्यांची वाहने यांची विस्तृत माहिती दिलेली आहे. त्यानुसार ब्रह्माणी ही ब्रह्मदेवासारखी, वैष्णवी ही विष्णूसारखी अशा रीतीने त्या त्या देवाच्या शक्ती या त्या त्या देवतेनुसार शिल्पांकित केल्या गेल्या पाहिजेत. ब्रह्माणी म्हटले की तिचे वाहन आणि तिची आयुधे हे ब्रह्मदेवासारखी असायला हवीत. मग ब्रह्माणी शिल्पांकित करताना स्त्रीप्रतिमा जी बसलेल्या स्थितीत आहे. जिने पिवळे वस्त्र परिधान केलेले आहे. जिच्या वरच्या पाठीमागील हातात सुळा आणि अक्षमाला असून, तिचा उजवा हात अभय मुद्रेत तर दावा हात वरद मुद्रेत असावा. तिचे वाहन हंस दाखवलेले असावे आणि तिच्या मस्तकी जटामुकुट दाखवावा. हे असे पाहिले म्हणजे ही प्रतिमा ब्रह्माच्या शक्तीची आहे असे समजते. या सर्व मातृकांचा उजवा हात हे अभय मुद्रेत तर डावा हात वरद मुद्रेत दाखवलेला असतो. पाठेमागे असलेल्या दोन हातात आयुधे असतात. आणि पायाशी त्या त्या देवतेची वाहने असतात. वैष्णवी असेल तर पाठीमागच्या हातात शंख आणि चक्र तर पायाशी गरुड, डोक्यावर किरीट मुकुट. इंद्राणीच्या वरच्या हातात वज्र आणि शक्ती तर पायाशी वाहन हत्ती. तिचा रंग लाल तर डोक्यावर किरीट. विष्णूधर्मोत्तरपुराणानुसार तिला सहस्त्र नेत्र आणि तिचा रंग सोनेरी असावा.
चामुंडा शिल्पित करताना अत्यंत भयावह अशी दाखवलेली असते. केस अस्ताव्यस्त पिंजारलेले, शरीरावर मांस नाही. सगळ्या बरगडय़ा दिसताहेत, पायाचे स्नायू दिसतात. तिने मुंडक्यांचा मुकुट परिधान केलेला आहे. एका हातात मुंडके आणि दुसऱ्या हातात कपाल धरलेले. तिचे सुळे बाहेर आलेले दिसतात. कधी कधी तिच्या पोटावर विंचू शिल्पित केलेला असतो. मानवी शव हे तिचे वाहन असून ती त्यावर उभी दाखवतात. पूर्वकरणागम या ग्रंथानुसार तिचे तोंड उघडे दाखवतात आणि तिच्या डोक्यावर चंद्राची कोर दाखवतात. तिचे वाहन घुबड असते तर तिच्या ध्वजावर गरुड असतो. माहेश्वरी शिल्पांकित करताना तिच्या वरच्या दोन हातांत शूल आणि अक्षमाला असते, तिचा मुकुट हा जटामुकुट असतो तर तिचे वाहन नंदी असतो. विष्णुधर्मोत्तरपुराणानुसार तिला पाच तोंडे दाखवलेली असतात, त्या प्रत्येकाला तीन डोळे दाखवलेले असतात. तिचा रंग पांढरा असून तिच्या सहा हातात सूत्र, डमरू, शूल आणि घंटा तर पुढचे दोन हात वरद आणि अभय मुद्रेत दाखवलेले असतात. कुमार म्हणजेच कार्तिकेयाची शक्ती कौमारी शिल्पांकित करताना तिच्या दोन हातांत शक्ती आणि कोंबडा दाखवतात. उर्वरित हात अर्थातच अभय आणि वरद मुद्रेत असतात. वाराही दाखवताना तिचे तोंड वराहाचे असते. तिच्या दोन हातांत हल आणि शक्ती असते तर तिच्या मस्तकी करंडमुकुट असतो. विष्णुधर्मोत्तरपुराण या तपशिलात काही गोष्टींची भर घालते. त्यानुसार तिला सहा हात असून त्यात दंड, खड्ग, खेटक आणि पाश असतात. उर्वरित दोन हात अभय आणि वरद मुद्रेत असतात. पूर्वकरणागमानुसार तिच्या हातात शारंग धनुष्य दाखवलेले असते. तसेच अनेक ठिकाणी या सप्तमातृकांच्या शेजारी असलेला वीरभद्र हा वीणावादन करताना दाखवलेला असतो.
सप्तमातृकांची वाहने, आयुधे त्याचे मुकुट यांची माहिती असल्यावर आपल्याला विविध मंदिरांमधून शिल्पांकित केलेले सप्तमातृकापट्ट पाहताना त्यांची तपशीलवार माहिती होते. कर्नाटकात विविध मंदिरांमधून हे पट्ट पाहायला मिळतात. सागर या गावाजवळ असलेल्या केळदी या गावी असलेल्या मंदिरात सुंदर असा सप्तमातृका पट्ट दिसतो. महाराष्ट्रातसुद्धा मुख्यत्वे मराठवाडय़ात हे असे सुंदर आणि देखणे सप्तमातृकापट्ट मंदिरांतून पाहायला मिळतात. लातूर इथल्या मंदिरात असाच सुंदर सप्तमातृका पट्ट आहे. तसेच धर्मापुरी इथे असलेल्या किल्ल्यात पूर्वी एखादे मंदिर असावे. त्या मंदिरांचे अवशेष त्या किल्ल्यात तटबंदीमध्ये वापरलेले दिसतात. त्या अवशेषातच एक सुंदर सप्तमातृकापट्ट पाहायला मिळतो. सप्तमातृकांच्या शेजारी एका बाजूला वीरभद्र तर दुसऱ्या बाजूला गणपती कोरलेला असतो. गणपती हा गणांचा अधिपती असल्यामुळे या सप्तमातृकांच्या बाजूला त्याचे शिल्पांकन केलेले असते. सप्तमातृकांची सर्वात भव्य आणि मोठी शिल्पे आपल्याला वेरूळच्या लेणीमध्ये पाहायला मिळतात. वेरूळच्या कैलास लेणीत यज्ञशाळा म्हणून ठिकाण आहे. तिथे भव्य आकाराच्या सप्तमातृका कोरलेल्या पाहायला मिळतात. पण त्या खूपच भग्न झालेल्या आहेत. इथे त्या सप्तमातृकांसोबत राणी माणकावतीचे शिल्पसुद्धा आहे. इथल्या रामेश्वर लेणीत (लेणी क्रमांक २१) सप्तमातृकांचे भव्य शिल्प पाहायला मिळते. अतिशय देखण्या, डौलदार सप्तमातृका या लेणीमध्ये कोरलेल्या पाहायला मिळतात. मराठवाडय़ाचे वैभव असलेल्या औंढय़ा नागनाथ मंदिरावर असलेल्या सप्तमातृकांचा पट्ट अत्यंत देखणा आहे. काही शिल्पे भग्न झालेली दिसतात तरीसुद्धा त्यांचे सौंदर्य काही कमी होत नाही. इथे सप्तमातृकांच्या मधोमध गणपती शिल्पित केलेला आहे. खूप सुंदर अशा या मातृकांच्या पायाशी त्यांची वाहने आणि हातात विविध आयुधे दाखवलेली आहेत.
शेजारी बसलेल्या सप्तमातृका हे सगळीकडे दिसतेच, परंतु महाराष्ट्रात नांदेड जिल्ह्य़ात मुखेड गावी दाशरथेश्वर मंदिराच्या बाह्य़िभतींवर नृत्य करणाऱ्या सप्तमातृकांच्या मूर्ती आहेत. हे मंदिर कल्याणी चालुक्यांच्या राजवटीमधले आहे. अतिशय सुंदर अशा या मातृका काहीशा भग्न झालेल्या आहेत. मात्र त्यांचा आवेश, नृत्य करताना शरीराला आलेला बाक आणि त्यांच्या चेहऱ्यावरील हावभाव निव्वळ देखणे आहेत. सप्तमातृकांचे अगदी निराळे या ठिकाणी पाहायला मिळते.
प्राचीन भारतीय संस्कृतीचा अभ्यास करताना काही गोष्टी प्रकर्षांने जाणवतात त्या म्हणजे एखादे गहन तत्त्वज्ञान सर्वसामान्य माणसांना सांगायचे असेल तर ते विविध कथांद्वारे सांगितले जाते. पुराणेसुद्धा आपल्याला अनेक देवदेवता, राक्षस यांच्या कथा सांगतात मात्र त्या पाठीमागे काही ना काही तत्त्वज्ञान सांगायचे असते. सप्तमातृकांच्याद्वारे वराहपुराण असेच एक मोठे तत्त्वज्ञान आपल्यासमोर मांडू पाहते आहे. त्यानुसार शिव, अंधकासुर किंवा या मातृका ही सगळी रूपके आहेत. ती आपल्या मनाच्या विविध अवस्थांची प्रतीके म्हणून पाहायला हवीत. शिव आणि अंधकासुराचे युद्ध म्हणजे आत्मविद्या किंवा आत्मज्ञान आणि अज्ञानरूपी अंधकार यांचे युद्ध समजले गेलेले आहे. तसेच हे पुराण पुढे असेही सांगते की या सात मातृका म्हणजे मानवी स्वभावाचे दोष सांगितलेले आहेत. योगेश्वरी हे काम अथवा इच्छा, महेश्वरी हे राग-क्रोध, वैष्णवी हे लोभ, ब्रह्माणी मद, कौमारी मोह, इंद्राणी मत्सर, वाराही असूया आणि चामुंडा हे पशुत्व याचे प्रतीक आहेत. ज्ञानरूपी शिवाने हे सगळे दोष आपल्या काबूत ठेवले आणि त्यामुळे त्याला अज्ञानरूपी अंधकासुरावर विजय मिळवता आला. मनाचे हे सगळे कंगोरे जरी असले तरी ते काबूत ठेवून योग्य दिशेने त्यांचा वापर केला तर अज्ञानरूपी अंधकाररूपी अंधकासुराचा नायनाट करणे सर्वसामान्य व्यक्तीलादेखी सहज शक्य असते. गहन तत्त्वज्ञान सरळ सोप्या गोष्टींमधून लोकांसमोर मांडायचे पुराणांचे हे कसब म्हणूनच वाखाणण्याजोगे आहे.
(संदर्भ : एलिमेंट ऑफ हिंदू आयकॉनोग्राफी- टी. ए. गोपीनाथ राव)
देवी विशेष
जय पाटील – response.lokprabha@expressindia.com
देवदेवतांच्या आपल्या मनातील कल्पना कशा तयार झाल्या, याचा मागोवा घेताना आपण विविध चित्रे, मूर्ती, शिल्पांपर्यंत पोहोचतो. देशाच्या निरनिराळ्या भागांत आढळणाऱ्या पारंपरिक कलाप्रकारांत शक्तीची अर्थात देवीची विविध रूपे प्रतिविंबित झालेली दिसतात. स्थल-कालानुसार त्यात बदलही होत गेल्याचे दिसते.
देवी कधी एखाद्या गुंफेत रेखाटलेल्या प्राचीन चित्रांतून दर्शन देते, कधी एखाद्या पुरातन मंदिराच्या गाभाऱ्यात विराजमान झालेली दिसते, कधी एखादे पट्टचित्र व्यापून उरते, कधी लघुचित्रांमधील नजाकतदार आकृतींतून लक्ष वेधून घेते, कधी ती धातूच्या डौलदार मूर्तीतून प्रकट होते, कधी सांकेतिक यंत्राच्या रूपात तर कधी एखाद्या नवचित्रकाराच्या कुंचल्यातून उमटते. शक्तिरूपाविषयीच्या मानवी संकल्पना कशा विकसित होत गेल्या असाव्यात, याचा अजमास बांधण्यासाठी ही चित्र-शिल्पे आपल्याला साहाय्य करतात.
देवीविषयीच्या श्रद्धा-परंपरांवर ‘मरकडेय पुराणा’तील ‘देवीमाहात्म्या’चा प्रभाव सर्वाधिक दिसतो. देवीच्या सध्या उपलब्ध असलेल्या अनेक चित्र-शिल्पांतून याच माहात्म्यातील कथा कथन केलेल्या दिसतात. सृष्टीच्या तीन अवस्थांचे वर्णन करणाऱ्या देवीमाहात्म्याच्या पहिल्या भागात सृष्टीचा रचनाकार ब्रह्माचा वध करण्यासाठी मधु आणि कैतभ हे दोन दैत्य निघालेले असतात. ब्रह्मा विष्णूला रक्षणाची विनंती करतो. मात्र महामायेच्या प्रभावामुळे विष्णू निद्रिस्त असतो. महामायेने आपला प्रभाव दूर करावा, यासाठी ब्रह्मा तिची आराधना करतो. विष्णू निद्रेतून जागा होतो आणि दैत्यांना पराभूत करतो. दुसऱ्या भागात पाशवी शक्तींच्या रूपात महिषासुर दाखवण्यात आला आहे. त्याचा अडथळा दूर करण्यासाठी देवी महिषासुरमर्दिनीच्या रूपात अवतीर्ण होते. तिच्या विकट हास्याने धरणी हादरते. त्यामुळे चिडलेला महिषासुर वाघ, हत्ती आणि म्हशीचे रूप घेऊन देवीवर आक्रमण करतो. तरीही देवी त्याचा वध करते. तिसरा भाग आहे शुंभ निशुंभाच्या पराभवाचा. यात असुरांनी सर्व रत्नांवर ताबा मिळवलेला असतो, मात्र सर्वात मौल्यवान रत्न म्हणजे देवी, हे त्यांच्या लक्षात येते. असुरांना देवी मिळावी, म्हणून ते प्रयत्न सुरू करतात. युद्धात जो माझा पराभव करील, त्याला मी प्राप्त होईन, असे आवाहन देवी करते. तिला आणण्यासाठी चंड आणि मुंड या दैत्यांना पाठवण्यात येते. मात्र देवी कालीचे उग्र रूप धारण करते. तिच्या हाती छाटलेले मुंडके आणि तलवार असते. गळ्यात मानवी मुंडक्यांची माळ असते. तिची त्वचा काळसर झालेली असते. देवी त्यांना पराभूत करून अजिंक्य राहते. चंड-मुंडाला पराभूत केल्यामुळे ती चामुंडा म्हणूनही ओळखली जाते.
या कथा कधी लघुचित्रांच्या तर कधी शिल्पांच्या रूपात समोर येतात. यातील महिषासुरमर्दिनीचे रूप अनेक चित्र-शिल्पांत दिसते. सहाव्या शतकातील महिषासुरमर्दिनीचे शिल्प महाराष्ट्रातील घारापुरी येथे आढळले आहे. बेसाल्ट खडकातील हे शिल्प भग्नावस्थेत आहे. मध्य प्रदेशात आढळलेले नवव्या शतकातील शिल्प मात्र उत्तम स्थितीत आहे. वालुकाश्मात कोरलेल्या या शिल्पातील देवीला चार भुजा आहेत, त्यापैकी एका हातात ढाल तर दुसऱ्या हातात तलवार आहे. ती महिषासुरावर आरूढ झाली असून आकाशातून देव हे दृश्य पाहात आहेत. अठराव्या शतकाच्या पूर्वार्धातील गुलेर शैलीतील एका चित्रात देवी महिषासुराचा वध करताना दिसते. यात अष्टभुजा देवी वाघावर आरूढ होऊन महिषासुरावर त्रिशूळ उगारलेल्या स्थितीत दिसते. तिचा वाघ बैलाच्या पाठीवर उभा आहे आणि त्या बैलाचे तिने छाटलेले मुंडके बाजूलाच पडलेले आहे. तिच्या हातांत आसुड, तलवार, ढाल, त्रिशूळ, गदा, घंटा, धनुष्य अशी विविध अस्त्रे आहेत. ही सर्व अस्त्रे तिने महिषासुरावर रोखलेली आहेत. सर्व देव आकाशातून हे दृश्य पाहताना दिसतात. १७७० ते १७८० दरम्यानच्या एका चित्रातही हे दृश्य आहे. बंगालमध्ये आढळलेल्या एका शिल्पात महिषासुराचा वध अतिशय कलात्मकतेने साकारण्यात आला आहे.
कर्नाटकात आढळलेल्या १०व्या शतकातील शिल्पात दुर्गा आसनस्थ दिसते. तिला चार भुजा असून त्यांपैकी एका हातात तलवार आहे. एकोणिसाव्या शतकाच्या मध्यातील एका चित्रात दुर्गेने शुंभ, निशुंभाशी केलेल्या युद्धाचे दृश्य चितारण्यात आले आहे. यातही दुर्गा अष्टभुजा रूपात असून वाघावर स्वार झाली आहे. युद्धातील तीन प्रसंग एकाच चित्रात दर्शवण्यात आले आहेत. महिषासुरवधाच्या चित्रात आणि या चित्रात देवीच्या हाती असलेली अस्त्रे जवळपास सारखीच आहेत. फक्त यात एका चित्रात देवी शंख फुंकताना दिसते. हे चित्र पंजाब हिल्स शैलीतील आहे.
याच ‘र्मकडेय पुराणा’त असलेल्या ‘भद्रकाली माहात्म्य’ किंवा ‘दारिका वधम्’ या भागात दारिकासुराचा वध करण्यासाठी देवीने भद्रकालीचे रूप घेतल्याची कथा आहे. त्यावर आधारित चित्रात देवी दारिकासुराचा वध करून त्याच्या पाठीवर उभी राहिलेली दिसते आणि ब्रह्मा, विष्णू आणि शिव तिचे गुणगान करताना दिसतात. १६६०-७०च्या दरम्यानचे हे चित्र बासोहली शैलीतील आहे.
अष्टलक्ष्मींपैकी एक असलेली गजलक्ष्मी देशात विविध शिल्पांत आणि चित्रांत पाहायला मिळते. तंजावर शैलीतील चित्रांत ती कमळावर पद्मासनात बसलेली दिसते. चार भुजा असलेल्या या देवीच्या वरच्या दोन हातांत कमळाची फुले आहेत. दोन्ही बाजूंना हत्ती आहेत. औरंगाबादमधील पितळखोरा येथे आढळलेल्या दुसऱ्या शतकातील शिल्पात गजलक्ष्मी कमळावर आसनस्थ दिसते. तिच्या दोन्ही बाजूंना हत्ती उभे असून ते जलाभिषेक करताना दिसतात. गुजरातमध्ये आढळलेल्या बाराव्या शतकातील शिल्पात मात्र तिने वरील दोन हातांमध्येच हत्ती पेललेले दिसतात. तिसऱ्या शतकातील नाण्यावर आढळलेली गजलक्ष्मीची प्रतिमा सध्या उपलब्ध असलेल्या प्रतिमांपैकी सर्वात जुनी प्रतिमा आहे. कोकण आणि गोव्यात ही देवी गजान्तलक्ष्मी, भाऊका, केळबाई या नावांनी ओळखली जाते. ही समृद्धीची देवता आहे. तिच्या दोन्ही बाजूंना असलेल्या हत्तींच्या सोंडेतून जलाभिषेक होताना दिसतो. त्यामुळे काही भागांत तिची पर्जन्यदेवता म्हणूनही आराधना केली जाते.
काळाच्या विविध टप्प्यांत मौखिक परंपरा, लिखित साहित्यातून देवीची विविध रूपे भक्तांसमोर येत राहिली. संपत्ती, समृद्धी, विद्या, वंशवृद्धी, पर्जन्य, दुष्ट शक्तींपासून रक्षण अशा विविध उद्देशांनी कित्येक शतके शक्तीच्या या रूपांची पूजा केली गेली. त्याचे प्रतिबिंब विविध कलांतून उमटत राहिले. देवीची रूपे कलात्मक स्वरूपात मांडून अनेक अनामिक कलाकारांनी कलेचा इतिहास समृद्ध केला आहे.
हे
शोध महिषासुरमर्दनीचा!
भारतातील अनेक भागांत शक्तीची उपासना करण्यासाठी देवीच्या दुर्गा या रूपाची पूजा केली जाते. महिषासुरमर्दनिी, भवानी, कात्यायनी इत्यादी नावांनी लोकप्रिय असलेल्या या देवतेच्या मूर्तीच्या उगमाचा आणि विकासाचा पुरातत्त्वीय पुरावे, प्राचीन साहित्य, नाणी, शिलालेख आणि मूर्तीशास्त्र यांच्या आधारे घेतलेला हा वेध.
प्रागतिहासिक काळापासून मानव विविध रूपातील देवतांची आराधना करत आला आहे. स्त्रीच्या सृजनशक्तीचा आदर करण्यासाठी म्हणूनच त्याने शक्तीची, स्त्रीरूपातील देवतांची पूजा करायला सुरुवात केली असावी. जगभर मिळणाऱ्या प्रागतिहासिक काळातील मातृदेवता म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मातीच्या मूर्ती याची साक्ष देतात. ऑस्ट्रिया आणि चेक रिपब्लिक येथे सापडलेल्या मातीच्या व दगडी प्रतिमा तीस ते अठ्ठावीस हजार वर्षांपूर्वीच्या आहेत. या प्रतिमांना आता व्हीनस म्हणून ओळखले जाते. शताल हुउक (तुर्कस्थान), टेपे सरब (इराण), टेपे गवरा (इराक), मुंडिगाक (अफगाणिस्तान) इत्यादी ठिकाणांबरोबरच भारत व विद्यमान पाकिस्तानातील सिंधू संस्कृतीच्या स्थळांमध्ये मातृदेवतांच्या मातीच्या भाजलेल्या मूर्ती उत्खननात सापडल्या आहेत. या मूर्ती साधारणपणे आठ ते चार हजार वर्षांपूर्वीच्या आहेत. अर्थातच या मूर्ती वरील प्रत्येक संस्कृतीमध्ये कोणत्या नावाने ओळखल्या जात होत्या हे सांगणे शक्य नाही. पण संशोधक त्यांना मातृदेवता असे संबोधतात. दक्षिण भारतात आदिचन्नलूर येथे लोहयुग संस्कृतीतील मातृदेवतेची तांब्याची मूर्ती सापडली आहे. पुणे जिल्ह्यतील इनामगाव येथे झालेल्या उत्खननात एका मातीच्या छोटय़ा पेटीसारख्या आवरणात ठेवलेली स्त्रीदेवतेची मूर्ती सापडली होती. सुरुवातीला अत्यंत साध्या असणाऱ्या मातृदेवतांच्या या भाजक्या मातीच्या मूर्ती मौर्य, शुंग, कुशाण राजांच्या काळात इसवी सनापूर्वी तिसरे शतक ते इसवी सनाचे तिसरे शतक विविध अलंकारांनी सजलेल्या अशा देखण्या बनवल्या जाऊ लागल्या. याच काळातील स्थानिक स्त्रीदेवता म्हणून पुजल्या जाणाऱ्या यक्षींच्या दगडी मूर्ती विदिशा, बारहूत, मथुरा, सांची येथे आढळल्या आहेत.

भारतात कुशाण राजांच्या काळात मोठय़ा प्रमाणावर देवतांच्या पाषाणाच्या प्रतिमा निर्माण होऊ लागल्या होत्या. सरस्वती, लक्ष्मी, पार्वती या ब्रह्मा, विष्णू, आणि महेशाशी संबंधित देवतांच्या प्राचीन प्रतिमा उत्तरभारतात सर्वत्र आढळतात. विशेषत शैव आणि शाक्त पंथाशी संबंधित दुर्गा या देवीच्या अनेकविध प्रतिमा सापडतात. आगमग्रंथांनुसार तिची नऊ रूपे आहेत. त्याव्यतिरिक्त देवीचे महिषासुरमर्दनिी हे रूप भारतात अत्यंत लोकप्रिय आहे. या दुर्गा महिषासुरमर्दिनीच्या मूर्तीचा उदय आणि आतापर्यंत झालेला प्रवास जाणून घेण्याचा हा एक प्रयत्न.
प्राचीन संस्कृत साहित्यातील संदर्भ
या दुर्गादेवीचे लिखित पुराव्यातील प्राचीनत्व शोधण्यासाठी भारतातील सर्वात प्राचीन वैदिक साहित्याचा संदर्भ तपासावा लागतो. ऋग्वेद व अथर्ववेद संहितांतील देवतांमध्ये इंद्र, मित्र, वरुण, अग्नि इत्यादी पुरुषदेवतांचे प्राबल्य आहे. याशिवाय अदिती, पृथ्वी, वाक्, श्री, यमी, उषा इत्यादी स्त्रीदेवता वेदांमध्ये आढळतात. परंतु कात्यायनी, पार्वती, उमा याची नावे या वेदांमध्ये येत नाहीत. कृष्ण यजुर्वेदाच्या तत्तिरीय आरण्यकात रुद्राच्या पत्नी म्हणून अंबिका आणि उमा यांचा उल्लेख येतो. याच तत्तिरीय आरण्यकात कात्यायनी, कन्याकुमारी, दुर्गी यांना एकाच देवीची नावे म्हणून संबोधले आहे. तसेच वरदा, वेदमाता इत्यादी स्त्रीदेवतांचाही उल्लेख केला आहे. परंतु या स्त्रीदेवतांचे महत्त्व काय होते हे सांगता येत नाही.
केनोपनिषदात रुद्रपत्नी उमेचा उल्लेख हैमवती म्हणजे हिमवत पर्वतातील मुलगी असा आढळतो. रुद्र या पर्वताशी संबंधित देव असल्यामुळे त्याची पत्नी हिमवत पर्वताशी संबंधित असणे साहजिकच आहे. उत्तर वैद्री काळातील हिरण्यकेशी गृह्य़सूत्र या ग्रंथामध्ये भवानी, दुर्गा, भद्रकाली या देवींची नावे येतात. तर बौधायन गृह्य़सुत्रात दुर्गाकल्पच आढळते. पारस्कर गृह्य़सूत्रातील ‘शूलगव’ यज्ञाच्या विधीत आहुती देताना शर्वाणी, भवानी इत्यादी देवशक्तींना आहुती द्यावी, असे वर्णन आढळते.
इसवीसनापूर्वी पाचव्या शतकात संस्कृत व्याकरणकार पाणिनी याने रचलेल्या अष्टाध्यायी या ग्रंथात भवानी, शर्वाणी, रुद्राणी आणि मृडाणी यांचा उल्लेख आहे. शिवाच्या भव, शर्व, रुद्र आणि मृड या चार रूपांच्या शक्ती म्हणून आपण त्यांना ओळखू शकतो. अर्थात या काळात त्यांचे किती महत्त्व होते ते मात्र कळत नाही.

इसवीसनापूर्वी तिसऱ्या शतकात कौटिल्याने लिहिलेल्या ‘अर्थशास्त्र’ या ग्रंथात नगराच्या मध्यभागी इतर देवतांबरोबरच मदिरा नावाच्या देवीचे मंदिर उभारावे असे सांगितले आहे. काही संशोधकांच्या मते मदिरा ही कृषीदेवता होती, तर काहींच्या मते ही दुर्गा असावी. या अर्थशास्त्र ग्रंथातच एके ठिकाणी तळघरांच्या दाराच्या चौकटीवर देवी प्रतिमा काढावी असे सांगितले आहे.
रामायणामध्ये लक्ष्मीच्या प्रतिमेच्या काही उल्लेखांव्यतिरिक्त शक्तीपूजनाचे संदर्भ आढळत नाहीत. महाभारताच्या विराट आणि भीष्म पर्वात देवीचे स्तवन सापडते. महाभारतात ती विन्ध्यवासिनीच्या स्वरूपात येते.
भास या प्रसिद्ध संस्कृत नाटककाराच्या नाटकांत कात्यायनी, दुर्गा इत्यादी देवींचे उल्लेख येतात. ‘स्वप्नवासवदत्त’ या भासाच्या प्रसिद्ध संस्कृत नाटकात पाटलीपुत्र येथे कात्यायनीचे मंदिर असल्याचा उल्लेख आहे. तसेच कात्यायनीने शुंभ, निशुंभ, महिष यांचा वध केल्याचे वर्णन येते. शुद्रकाने लिहिलेल्या ‘मृच्छकटिक’ या संस्कृत नाटकातील नायक चारुदत्त याला मारणाऱ्या चांडाळाची कुलदेवता म्हणून दुग्रेचा उल्लेख आहे. दन्डीने लिहिलेल्या ‘दशकुमारचरित’ या संस्कृत ग्रंथात दुग्रेचा उल्लेख ‘विन्ध्यवासिनी दुर्गा’ म्हणून अनेकदा येतो. तिच्या आशीर्वादाने एका राजाला अपत्यप्राप्ती झाल्याचा उल्लेख आहे तसेच तिचे मंदिर असल्याचाही उल्लेख या ग्रंथात येतो.
‘हर्षचरित’ या बाणाभट्ट लिखित गद्यपद्यमिश्रित संस्कृत काव्यात हर्षांच्या दरबारात जाताना वाटेतील एका मल्लकूट गावाच्या बाहेर ‘चंडी कानन’ म्हणजे चंडीचे अरण्य असल्याचा उल्लेख येतो. या अरण्यातील झाडांवर कात्यायनी देवीच्या प्रतिमा कोरलेल्या होत्या व वाटसरू या प्रतिमांना वंदन करत असे वर्णन बाणाभट्ट याने केले आहे. बाण याने लिहिलेल्या ‘कादंबरी’ या संस्कृत ग्रंथात एक चंडीचे देऊळ असल्याचा व तेथे एक द्रविड पुजारी असल्याचा उल्लेख आहे. याच ग्रंथात राणी अपत्यप्राप्तीसाठी चंडिकेची उपासतापास करून आराधना करते असे दर्शविले आहे.
याशिवाय विविध पुराणातून दुग्रेची तसेच महिषासुरमर्दनिीची महती वर्णिलेली आहे. वामन पुराणात महिषासुराची वधाची कथा येते. या कथेनुसार महिषासुराने देवीसमोर लग्नाचा प्रस्ताव ठेवला तेव्हा देवीने त्याला अट घातली की जर महिषासुराने तिला युद्धात हरवले तरच ती त्याच्याशी लग्न करेल. यानंतर झालेल्या युद्धात देवीने त्याचा पराजय करून त्याचा वध केला. अर्थात नंतरच्या काही पुराणातून ही कथा बरीच बदललेली दिसते. पण या कथेचे शुंभनिशुंभ वधकथेशी खूप साम्य आहे. त्यावरून पुराणनिर्मितीच्या काळात शुंभनिशुंभांचा वध करणारी विंध्यवासिनी कौशिकी देवी आणि महिषासुर मर्दनिी यांचे एकीकरण करण्यात आले असावे कारण त्यानंतर महिषासुरमर्दिनीला देखील विन्ध्यवासिनी म्हणून ओळखले जाऊ लागले. या प्राचीन साहित्यिक उल्लेखांवरून दुर्गा महिषासुरमर्दिनीचा नुसता उल्लेख ते तिच्या पराक्रम कथा यांचा आलेख मिळतो.
प्राचीन कोरीव लेखांमधील दुर्गा
भारतात सापडणाऱ्या कोरीव लेखांतून विविध प्रकारची तत्कालीन माहिती आपल्याला मिळते. अर्थातच त्यातून भारताच्या वेगवेगळ्या भागातील धार्मिक माहितीदेखील मिळते. देवीपुजेच्या इतिहासावर प्रकाश टाकणाऱ्या काही शिलालेखांचा उल्लेख इथे केला पाहिजे राजस्थानातील ‘होटी सादडी’ या गावातील भवरमाता मंदिराच्या गाभाऱ्याबाहेर इसवीसनाच्या सहाव्या शतकातील एक शिलालेख आहे. त्यात आरंभी तीक्ष्ण शूल हातात घेऊन असुराचा वध करणाऱ्या देवीला नमन केले आहे. ही देवी उग्र सिंहांच्या रथात बसलेली असून ती भक्तांचे कल्याण करते, अशा आशयाचा हा शिलालेख आहे. येथे देवीचे वर्णन करताना ती शिवाची अर्धागी असल्याचा उल्लेख केला आहे. या सर्व वर्णनावरून येथे सिंहवाहिनी दुर्गा अपेक्षित असावी यात शंकाच नाही. या शिलालेखाचा उद्देश राजाने देवीचा उत्तम प्रासाद (मंदिर) बांधला होता हे नोंदवण्याचा होता.

याशिवाय बिहारमधील नागार्जुनी टेकडय़ांमधील सहाव्या शतकातील अनंतवर्मन राजाच्या दोन लेखांमध्ये देवीचा उल्लेख आहे. यातील एका लेखात भूतपती आणि देवीच्या प्रतिमांची प्रतिष्ठापना केली होती असा उल्लेख आहे. भूतपती हे शिवाचेच एक नाव आहे, त्यामुळे ही देवी शिवशक्ती दुर्गा असावी. तर दुसऱ्या शिलालेखात महिषासुराच्या शिरावर देवीने ठेवलेल्या पायाला भक्तीभावाने नमन करून राजाने ‘अद्भुत विन्ध्य भूधर गुहे’मध्ये कात्यायनी देवीची प्राणप्रतिष्ठा केली असे नमूद केले आहे. याच शिलालेखात भवानी देवीसाठी राजाने एक गाव दान दिल्याचा उल्लेख आहे. गुहेत स्थापन केलेल्या कात्यायनी देवीच्या पूजेअच्रेसाठी या गावातील उत्पन्नाचा वापर व्हावा हे उद्दिष्ट होते. महिषासुरमर्दनिी, कात्यायनी व भवानी या देवीच्या तीनही रूपांचा उल्लेख हे या शिलालेखाचे वैशिष्टय़ आहे.
बसंतगढ (राजस्थान) येथील खिमेलमाता मंदिरापाशी सापडलेला इसवीसनाच्या सातव्या शतकाच्या सुरुवातीच्या काळातील एक शिलालेख या दृष्टीने महत्त्वाचा आहे. या शिलालेखाच्या आरंभी दुर्गा आणि क्षेमकरी क्षेमार्या यांना आवाहन केले आहे. तसेच या लेखात स्थानिक लोकांनी एकत्र येऊन मंदिर बांधल्याचा उल्लेख आहे. त्यात श्रीमातेच्या एका गणिकेचे नावही नमूद केले आहे. विविध आगमग्रंथानुसार नवदुर्गामध्ये गणले जाणारे क्षेमंकरी हे दुग्रेचेच कल्याणकारी रूप आहे. येथील देवीचे सध्याचे खिमेलमाता हे नाव क्षेमार्या या संस्कृत नावाचा स्थानिक भाषेतील अपभ्रंश आहे.
भरमोर (हिमाचल प्रदेश) येथील इसवीसनाच्या सातव्या शतकातील लक्षणा देवीच्या पितळी मूर्तीच्या पीठावर एक कोरीव लेख आहे. या लेखात राजाने पुण्यप्राप्तीकरिता लक्षणा देवीची स्थापना केली तसेच गुग्ग याने देवीची ही प्रतिमा घडवली असा उल्लेख केला आहे. प्रस्तुत लक्षणादेवीची मूर्ती महिषासुरमर्दनिीचीच आहे.
प्रतापगढ (राजस्थान) येथे सापडलेल्या दहाव्या शतकातील दानलेखाच्या आरंभी महिषासुराला मारणाऱ्या दुग्रेचे स्तवन केले आहे. याच लेखात कात्यायनी देवीचाही उल्लेख येतो.
या सर्व पुराव्यान्संदर्भात अमरकोश या संस्कृत कोशात येणारी दुग्रेची नावे बघणे आवश्यक ठरते. अमरकोशात तिची खालील नावे दिलेली आहेत.
उमा कात्यायनी गौरी काली हैमवतीश्वरी॥
शिवा भवानी रुद्राणी शर्वाणी सर्वमंगला।
अपर्णा पार्वती दुर्गा मृडाणी चंडिकांबिका॥
आर्या दाक्षायणी चव गिरिजा मेनकात्मजा।
आत्तापर्यंत आपण बघितलेली विविध ग्रंथातील व कोरीव लेखांतील नावे म्हणजे शैव अगर शाक्त पंथातील दुग्रेची विविध रूपे मानली जात होती हे अमरकोशातील या नोंदीवरून स्पष्ट होते.
प्राचीन नाण्यांवरील सिंहवाहिनी देवी
प्राचीन अफगाणिस्तानात नना या नावाची इराणी देवता प्रसिद्ध होती. कुशाण राजांच्या नाण्यावर ती आपल्याला दिसते. ही नना सिंहावर बसलेली दाखवली जाते. कुशाण राजांच्या कंदाहार ते पटनापर्यंत पसरलेल्या साम्राज्यात त्यांनी अनेक स्थानिक देवदेवतांना नाण्यावर स्थान दिले होते. अफगाणिस्तानातील रोबाटक या ठिकाणी सापडलेल्या इसवीसनाच्या दुसऱ्या शतकातील कुशाण राजांच्या अधिकाऱ्याच्या शिलालेखात इतर देवतांबरोबर याच नना आणि उमा यांचा अत्यंत आदरपूर्वक उल्लेख केला आहे. इसवीसनाच्या दुसऱ्या शतकात कुशाण राजा हुविष्क याच्या नाण्यांवर सिंहवाहिनी नना व सिंहवाहिनी उमादेखील दिसते. हेच ननाचे व उमेचे सिंहवाहिनी रूप नंतर दुग्रेला प्राप्त होते.
या कुशाण राजांच्या नंतर उत्तर भारतात आलेल्या गुप्त राजांनी देखील अत्यंत सुंदर नाणी पाडली होती. चंद्रगुप्त या गुप्त घराण्यातील राजाच्या नाण्यावर एक सिंहवाहिनी देवी आहे. तिच्या एका हातात पाश आहे तर दुसऱ्या हातात निधीश्रुंग घेतलेले आहे. काही संशोधक या देवीला सिंहवाहिनी दुर्गा मानतात. अशा प्रकारे सिंह हे वाहन दुग्रेच्या प्रतिमेत येते.
प्राचीन शिल्पातील दुर्गा महिषासुरमर्दनी
तामलुक (पश्चिम बंगाल) येथे सापडलेली शुंग काळातील एक छोटय़ा उठावातील मृण्मूर्ती उल्लेखनीय आहे. ही स्त्री मूर्ती सालंकृत असून तिचा केशसंभारही फार मोठा दाखवलेला आहे. तिच्या केशसंभारात पाच छोटी आयुधे दागिन्यांसारखी दाखवण्यात आलेली आहेत. ही आयुधे म्हणजे अंकुश, त्रिशूळ, परशु, वज्र आणि ध्वज ही आयुधे नंतरच्या काळात देवीच्या मूर्तीमध्ये बघायला मिळतात. त्यामुळे काही संशोधक या मृण्मूर्तीला दुग्रेची आद्य प्रतिमा मानतात अर्थातच ही आयुधे शौर्य आणि राजवैभव दर्शवत असल्यामुळे ही स्त्रीदेवता महत्त्वाची असणार हे नक्की.
कुशाण काळात (इसवीसनाचे पहिले ते तिसरे शतक) या काळातील काही महिषासुरमर्दिनीच्या मूर्ती मिळाल्या आहेत. ही चतुर्भुज देवीची मूर्ती दोन हातांनी एका महिषाला पकडून मारते आहे. अशा आविर्भावातील आहे. देवीचे मागचे दोन्ही हात आता दिसत नाहीत. तिने कानात जड कुंडले घातली आहेत. कुशाण काळातील अशा काही मूर्ती उत्तर प्रदेश आणि राजस्थानमध्ये सापडल्या आहेत.
गुप्तकालात (इसवीसनाचे चौथे ते पाचवे शतक) ज्याप्रमाणे अनेक देवीदेवतांच्या मूर्तीची मानके बनली तशीच ती दुर्गा महिषासुरमर्दनिीच्या मूर्तीचीही बनली. उदयगिरी मध्य प्रदेश येथील लेण्यामध्ये गुप्त काळातील एक सुंदर द्वादशभुजांची महिषासुरमर्दनिी कोरलेली आहे. तिने हातामध्ये वज्र, खड्ग, त्रिशूळ, भाला, घंटा इत्यादी घेतले आहे. तिचा डावा पाय महिषासुराच्या डोक्यावर ठेवलेला आहे तर हातातील त्रिशुळाने त्याचा वध करते आहे.
बदामीच्या चालुक्यांच्या काळात (सहावे ते आठवे शतक) निर्माण झालेल्या ऐहोळे येथील दुग्रेच्या प्रतिमेचा उल्लेख करणे आवश्यक आहे. ऐहोळे येथील दुर्गामंदिर म्हणून ओळखले जाणाऱ्या मंदिराच्या बाहय़भागावर एक महिषासुरमर्दनिीची अत्यंत मनमोहक मूर्ती आहे.
वर उल्लेख केलेल्या भारमोर हिमाचल प्रदेश येथील शिलालेखात उल्लेखलेली लक्षणादेवी ही देखील महिषासुरमर्दिनीची मूर्ती आहे. जवजवळ चार फूट उंचीची ही पितळी मूर्ती सातव्या शतकातील आहे. या चतुर्भुजी देवीच्या हातात त्रिशूळ खड्ग आणि घंटा आहे. एका हाताने तिने जमिनीवर पडलेल्या महिषाची शेपटी पकडली आहे आणि हातातील त्रिशुळाने ती महिषाचा वध करीत आहे.
महाराष्ट्रात वेरुळ येथील लेण्यामधेही महिषासुरमर्दनिीच्या प्रतिमा कोरल्या आहेत. वेरुळ येथील कैलास मंदिरात सिंहावर आरूढ झालेली देवी महिषासुराचा वध करते आहे असे चित्रण केले आहे. पल्लवराजांच्या काळात निर्माण झालेल्या महाबलीपुरम येथील एका रथमंदिरात सिंहावर आरूढ झालेल्या देवीचे अंकन आहे. येथे देवी तिच्या सेनेसह महिषासुराशी युद्ध करताना दाखवली आहे. इथे महिषासुर मानवी रूपात दाखवलेला असून त्याचे मुख मात्र महिषाचे आहे.
पाल राजांच्या काळात बंगाल, ओरिसा या प्रदेशात दुग्रेच्या उपासनेचा मोठय़ा प्रमाणावर प्रसार झालेला होता. या भागात अनेक भुजांच्या महिषासुरमर्दिनीच्या प्रतिमांचा विकास झालेला आपल्याला दिसतो. या प्रतिमांचा अभ्यास करताना असे दिसून येते की सुरुवातीला सिंह हा फक्त देवीचे लांच्छन म्हणून मूर्तीमध्ये येतो, पण नंतर तो देवीला महिषासुराला मारण्यात मदत करताना दाखवला जातो. तसेच इसवीसनाच्या सातव्या शतकांनंतरच्या मूर्तीत महिषाच्या कापलेल्या मानेतून असुर बाहेर येतांना दाखवण्यात येऊ लागला.
भारताबाहेरील दुर्गा महिषासुरमर्दनिीच्या प्रतिमा
भारताबाहेरही अफगाणिस्तान, नेपाळ, बांग्लादेश, कंबोडिया, जावा, इंडोनेशिया इत्यादी देशामध्ये महिषासुरमर्दिनीच्या मूर्ती सापडतात. अफगाणिस्तानातील गझनी येथील टेपे सरदार या ठिकाणी एक महिषासुरमर्दिनीची भंगलेली भव्य मूर्ती मिळाली आहे ती काबूल येथील राष्ट्रीय संग्रहालयात आणण्यात आली होती.
कंबोडिया येथील महिषासुरमर्दिनीच्या मूर्तीमध्ये चोल मंदिरातील मूर्तीचा प्रभाव पडलेला आहे. या महिषासुरमर्दनिीच्या मूर्तीच्या पीठावर महिषमुखाचे रेखाचित्र कोरलेले असते त्यावरून या प्रतिमेची ओळख आपल्याला पटते.
अवघ्या भारतभर आणि अफगाणिस्तानपासून ते इंडोनेशियापर्यंत आढळणाऱ्या या दुर्गा महिषासुरमर्दनिीचे आपल्या महाराष्ट्राशी विशेष नाते आहे. महाराष्ट्रातील साडेतीन शक्तीपीठांपकी एक असलेल्या जगदंबा तुळजाभवानीची प्रतिमा महिषासुरमर्दनिी या स्वरूपातीलच आहे. पंधराव्या शतकात लिहिल्या गेलेल्या ‘महिकावतीची बखर’ या नावाने प्रसिद्ध असणाऱ्या गद्यपद्यमिश्रित बखरीत श्रीदेवी आद्यशक्ती जगदंबिका महाराष्ट्राधर्मरक्षिका असा तिचा उल्लेख येतो. तर सोळाव्या शतकातील सुलतानशाहीने गांजलेल्या अवस्थेत संत एकनाथांनी
नमो निर्गुण निराकार, मूळ आदिमाया तूं साकार
घेऊनि दहा अवतार, करिसी दुष्टांचा संहार
दार उघड, बया दार उघड
अशा आळवणीनंतर म्लेंच्छांचा संहार करण्यासाठी तिची प्रार्थना केली होती.
सतराव्या शतकात छत्रपती शिवाजी महाराजांनी भवानी देवीच्या आशीर्वादानेच महाराष्ट्रात स्वराज्य स्थापन करून अलौकिक असा इतिहास रचला. तसेच तिची नित्य पूजा व्हावी म्हणून प्रतापगडावर भवानी देवीची प्रतिष्ठापना करून तिचे मंदिरही बांधले होते.
एकोणिसाव्या शतकात बंगालमधील दुर्गापूजनाचा प्रभाव बंकिमचंद्र चट्टोपाध्याय यांच्या ‘आनंदमठ’ या कादंबरीतील ‘वंदे मातरम्’ या गीतावर पडलेला दिसून येतो. इंग्रजांच्या पारतंत्र्यात अडकलेल्या भारतमातेला आदिशक्तीच्या रूपात कल्पून तिचा महिमा त्यांनी पुढील ओळींत वर्णन केला आहे.
त्वं हि दुर्गा दशप्रहरणधारिणी
कमला कमलदलविहारिणी
वाणी विद्यादायिनी
नमानि त्वां
नमामि कमलां अमलां अतुलां
सुजलाम् सुफलाम् मातरम्॥
अशा रीतीने आदिशक्तीच्या दशभुजा दुर्गा, लक्ष्मी आणि सरस्वती या तिन्ही रूपांत मातृभूमीचे वर्णन करून बंकिमचन्द्रांनी प्राचीन भारतीय परंपरेशी आपली नाळ जोडली.
अशा या दुर्गा महिषासुरमर्दिनीच्या विविध प्रतिमांचा, तिच्या संदर्भातील पुरातत्वीय पुराव्यांचा, शिलालेखांचा व तिच्या उपासनेच्या मध्ययुगीन, अर्वाचीन इतिहासाचा अभ्यास करताना लक्षात येणारी महत्त्वाची बाब म्हणजे संकटांवर मात करण्यासाठी व शत्रूवर विजय मिळवण्यासाठी तिची वीरांकडून केली जाणारी आराधना. प्राचीन काळापासून देवीच्या इतर रूपांपेक्षा दुर्गा महिषासुरमर्दनिी रूपात देवीची आराधना विशेषत वीरपुरुषांनी का केली असावी याचा बोध दुर्गा सप्तशतीमध्ये दिलेल्या ‘महिषान्तकरी येन पूजिता स जगत्प्रभु’ (ज्याने महिषासुरमर्दनिीला पूजिले तो जगाचा स्वामी होतो) या वाक्यावरून होतो.
आनंद कानिटकर – response.lokprabha@expressindia.com
शिव: मूर्तीशास्त्र
बदलती शिल्पे, बदलता समाज
बॉस्टनच्या म्युझियम ऑफ फाईन आर्टस (कला संग्रहालया) मध्ये आम्ही काय खाल्ले सारखे (अजूनच) रटाळ डिटेल्स कोणाला नको असतील असे धरून पुढे चालू करते...
आर्ट म्युझियम म्हटले की खरे तर आपल्या डोळ्यांसमोर शिल्पे, भिंतीवर अडकवलेली चित्रे, फारतर कलात्मक गालिचे अशा वस्तू येतात, पण बहुदा टीव्ही येत नाहीत/नसावेत. पण आम्ही खाणे आटपून मधल्या चौकातून जिन्याकडे जायला निघालो तो काही लोक भिंतीला टेकून समोर पाहत हसत असल्याचे दिसले. तर त्यांच्यासमोर भिंतीवर एकत्र जोडलेल्या पंधरा-वीस लहान टीव्हींचा एक संच होता. प्रत्येक टीव्हीत एका व्यक्तीचा क्लोजअप, आणि कानाला हेडफोन लावून ऐकू येत असलेले गाणे म्हणत असल्याचे चित्रीकरण दिसत होते. बाथरूममध्ये कोणी गात असताना जसे कोणी ऐकत नाही म्हणून निर्धास्त असतो तसे मन लावून गाणे म्हणत स्वतःत गुंगून गेलेल्या त्या सर्व लोकांना पाहून थोडी गंमत वाटली. पं. भीमसेन जोशी, लता, अशा अनेक गायकांचे "मिले सूर मेरा तुम्हारा" ज्यांना परिचित आहे त्यांना यात फारसे वेगळेपण वाटणार नाही. फरक फक्त एकच होता की सर्वजण एकच गाणे एकाच वेळी म्हणताना दिसत होते, त्या सर्वांचे मिळून एकच एक जोडलेले चित्र तयार झाले होते. त्यांच्याकडे बघताना असे वाटले की येत्या काळाची ही झलक आहे. खरे तर म्युझियममधील वस्तूंना "हात लावू नये" ही सूचना आपण बरेचजण पाळत असतो, पण तरी मनात आणल्यास वस्तू इथे समोरच आहे, मनात आणल्यास तिला स्पर्श करता येऊ शकतो ह्याची मनात जाणीव असते, खोलीतले गंध, दगडी शिल्पाचा थंडगारपणा, ह्या गोष्टी हा अनुभव घडवत असतात. पण कोणी सांगावे कदाचित पुढच्या काळात कलेचे आविष्कार बघण्याच्या पद्धती कदाचित स्पर्शरहित असू शकतील?!
खरे तर यापुढे अधिक फिरण्याचे मनात नव्हते. पण मागे एकदा येथे आलेले असताना म्युझियममधील भारतीय उपखंडाच्या दालनात खास राजस्थानी मिनिएचर (लहान) चित्रे बघून तशी चित्रे काढण्याच्या आणि रंगवण्याच्या संधीचा आम्ही पुरेपूर फायदा घेतला होता. त्याची आठवण आली आणि म्हटले जाण्याआधी परत एकदा तिथे जाऊ या.
या दालनाकडे जायला एक मोठी खोली ओलांडून जावे लागले. मिनिमलिस्ट (कमीतकमी) अशा सामानात विमानतळांवर असतात तशा काँप्युटरांच्या पुढे बसलेले म्युझियमचे कर्मचारी पाहून म्युझियमची वाटचाल स्पर्शरहित होण्याकडे चालली आहे असा संशय अशामुळे जरा दाटच झाला!
पण एकदा का या भारतीय दालनात आले की परत त्या कधीच्या काळी घडवलेल्या दगडा-मातीच्या वस्तू आपल्यापासून हाताच्या अंतरावर असतात. हडप्पा/मोहेंजोदारो येथील लहानलहान मातीच्या रांजणांपासून ते बौद्ध, जैन, हिंदू शिल्पकला, आणि काही मुस्लिम प्रभावाखालची चित्रे येथे ठेवलेली आहेत. यातील वस्तू इजिप्तमधील वस्तूंइतक्या भव्य नाहीत, काही तर दहा एक शतके इतक्याच जुन्या, म्हणजे खरे तर बर्यापैकी अलिकडच्या काळातील आहेत, त्यामुळे या वस्तूंना इजिप्तसारखे वलय नाही. शिवाय इजिप्तमधील प्रदर्शनाची जाहिरात कितीही भरभक्कम केली असली तरीही या दालनात आल्यावर एक प्रकारचा आपलेपणा वाटतो. तरी इथल्या भारतीय हॉटेलांमध्ये गेलो, की तिथे भिंतीवर लावलेले गणपती, राधा-कॄष्ण, फारतर लामणदिवे, किंवा उंच पितळी समया, आग्रा शैलीतली चित्रे, नक्षीकाम केलेली लाकडी पार्टिशने अशा सवयीच्या झालेल्या शोभेच्या वस्तूंकडे दुर्लक्ष करून आपल्या टेबलाकडे जाण्याचा एक प्रकारचा कोडगेपणा देखील आलेला असतो. त्यामुळे परत जेव्हा कुठेतरी खणून काढलेल्या ह्या वस्तू दिसतात त्यावेळी त्यांच्याकडे हॉटेलमधील शोभेच्या वस्तूंकडे पाहतो त्यापेक्षा वेगळ्या नजरेने पाहिले पाहिजे हे मुद्दाम लक्षात ठेवावे लागते. मग त्या नुसता वस्तू न राहता त्यात मागील संस्कृतीच्या खुणा, तंत्रज्ञानात झालेली प्रगती, तत्कालिन व्यापार-उदीमाची व्यापकता असे थोडे थोडे लक्षात येत जाते. थोडा का होईना इतिहास वाचलेला असला, की ह्या म्युझियमांकडे पाहण्याची एक वेगळी दृष्टी मिळते हेही खरे. शिवाय एखाद्या समाजाच्या आशा-आकांक्षांमध्ये काळाप्रमाणे होणारे बदलही जाणवू शकतात. म्युझियममध्ये आम्ही बरेच काही पाहिले, बरेच फोटो काढले. फोटो काढताना लक्षात आले नाही, पण नंतर असे वाटले की यात स्त्रियांच्या शिल्पांमध्ये काळानुरूप होत गेलेले बदल आपोआप थोडेफार टिपले गेले असे वाटते. शिल्पे करण्याच्या माध्यमात, तंत्रात आणि सादरीकरणातही खूपच फरक पडल्याचे दिसते.
ख्रिस्तपूर्व काळात स्त्रियांना देवतेचा दर्जा (मातृदेवता) दिला असावा अशी समजूत आहे. यापैकी पहिल्या मूर्तींची डोळे दाखवण्याची पद्धत अतिशय सोपी, लहान मुलांनाही करता येईल अशी दिसते. स्त्री असूनही मूर्तीच्या डोक्यावर एक प्रकारची पगडी दिसते आहे. पहिली मूर्ती करणे विशेष अवघड नाही. दुसर्या मूर्तीवर मात्र श्रम घेतले आहेत हे स्पष्ट आहे. ह्या स्त्रीने घातलेल्या विशिष्ट दागिन्याला छन्नविरा म्हणतात असे कळले. हा दागिना त्याकाळात बराच लोकप्रिय असावा. ह्या नटलेल्या मूर्तीवरून ती देवता असावी असे दिसत नाही. एखादी नर्तकी, आकर्षक स्त्री असावी तशी दिसते.
डोळे दाखवण्याची पद्धत आता खालच्या मथुरा येथील प्रतिमेमध्ये वेगळी, जरा सुधारलेली दिसते. शिवाय ही प्रतिमा भट्टीतून भाजून काढलेली आहे.
कान झाकून जातील इतकी मोठी कर्णभूषणे दिसतात. एवढे मोठे कानातले घातले तर कान ओघळतील असे आम्हाला सांगत, तसे त्यांना लहानपणी कोणी सांगितले नसावे! डोक्यावर बांधलेली तीन गोलाकार आभुषणे नक्की कशासाठी आहेत समजत नाही.
नंतरच्या स्त्रीप्रतिमांमध्ये आकार, लय, प्रमाणबद्धपणा, मोकळेपणा अधिक जाणवू लागतो. सांचीच्या प्रसिद्ध स्तूपाच्या एका तोरणावरील यक्षीचे अवशेष (इ. स. पहिले शतक).
या यक्षीला "फर्टिलिटी गॉडेस" म्हटले आहे. बुद्धानंतरच्या काही शतकांत अनेक स्तूप, लेणी बांधली गेली.
बुद्धाने तर करीत असलेला संसार सोडून दिला. त्याच्या गोष्टीत "मार" नावाचा राक्षस येतो, खरे तर मार म्हणजे बुद्धाला निर्वाणापासून दूर ठेवण्याचा प्रयत्न करणारा मोह. अमरावतीच्या स्तूपावरील ह्या चित्रात मार आपल्या मुलींना बुद्धाचे लक्ष त्यांच्याकडे जावे म्हणून पाठवतो. पण अशा सर्व मोहांवर विजय मिळवल्यानंतर बुद्धाला निर्वाण प्राप्त होतेच. वरील शिल्पातून दिसते ती बौद्ध शिल्पकलेची जुनी परंपरा आहे, या परंपरेने बुद्धाचे मनुष्यस्वरूपात चित्रण केले जात नाही, तर चित्रात बुद्ध असल्याचे त्याच्या पादुका, सिंहासन (कारण तो राजपुत्र होता) आणि बोधीवृक्ष यावरून दाखवले जाते. या शिल्पात स्त्रिया आहेतच, पण दुर्लक्षित आहेत.
मग येतात "हिंदू" देव-देवता. यात दोन्ही देव आणि देवता यांना महत्त्वाची स्थाने मिळालेली दिसतात. त्यांचे चेहरे आधीच्या शिल्पकलेहून अधिक आकर्षक, आणि नाजूक दिसतात. देव जरा कुटुंबवत्सलही झालेले दिसतात! सुंदर चेहरे, दागदागिने, दोनांहून अधिक हात असे या शिल्पांचे स्वरूप दिसू लागते. शंकर, पार्वती यांचे कुटुंब म्युझियममध्ये आहेच. गणपतीदेखील आपल्या दोन्ही पत्नींसह आहे. हरीहर (शंकर आणि विष्णू यांच्या संगमाने तयार झालेला - काही संशोधकांच्या मताने शैव आणि वैष्णव यांच्या "समन्वय" काळातील ) गोतावळ्यासह येथे आहे. तशीच महिषासुरमर्दिनी दुर्गा आहे. जावा येथील महिषासुरमर्दिनीचे हे नवव्या-दहाव्या शतकातले शिल्प. या दुर्गेचा चेहरा अगदी भारतीय म्हणावा असा नाही, त्यावर जावा येथील कारागिरांचीच छाप आहे. पण बाकी शिल्प मात्र भारतातील दुर्गेप्रमाणेच आहे.
रामायणातील सीताहरणाच्या दृष्याचे इंडोनेशियातील अकराव्या शतकातील शिल्प दिसते -म्हणजे या काळात रामायण इंडोनेशियापर्यंत पोचले होते.
तेराव्या शतकापर्यंत स्त्रियांचे प्रेमिक म्हणून मोकळेपणाने चित्रीकरण झालेले दिसते. हे हस्तिदंतामध्ये कोरलेले ओरिसामधले एक शिल्प. इथले कोरीवकाम अधिक वाढलेले दिसते, दागदागिने, आकार, विषय सर्वच दृष्टींनी कला विकसित झाल्याचे दिसते.
माती, दगड, हस्तिदंत, लाकूड अशा विविध माध्यमांमधून तयार केलेली ही शिल्पे बदलती सामाजिक स्थिती दाखवत असावीत असे वाटले. जरी एका दालनातील काही चार-दोन शिल्पांवरून तत्कालिन समाजाचे यथार्थ चित्र उभे करणे शक्य नसले तरी कळते की या शिल्पांमध्ये वैविध्य आहे, वस्तू तयार करण्याची तंत्रे हळूहळू पण खात्रीने विकसित होत गेली आहेत, त्या शिल्पांचे विषय बदलत गेले आहेत, याचाच अर्थ समाज गतिशील होता, भरभराटीस येत होता. भारताला स्वतःचा इतिहास नाही असे म्हणणार्या मार्क्सच्या लिखाणाचा प्रसिद्ध संशोधक डी. डी. कोसंबी यांनी कठोर समाचार घेतला आहेच, पण ही अशी शिल्पेही हे दाखवून देण्यास ठोस पुरावा ठरावी.
भारतात जे दैवत सर्वाधिक पुजले जाते ते म्हणजे शिव. शिव हा दोन्ही प्रकारे पुजला जातो. लिंग स्वरूपात आणि मूर्त स्वरूपात.
लिंग पूजा ही पार सिंधू संस्कृतीपासून पाहण्यात येते. अर्थात त्याकाळी लिंग पूजा ही शिव अथवा रूद्र देवतेची नसून ती होती प्रजनन शक्तीची. निसर्गाच्या पुनरुत्पादनाच्या चमत्काराचे प्रतिक म्हणून स्त्रीशक्तीची उपासना योनीपूजेच्या स्वरूपात तर पुरुष शक्तीची उपासना लिंग स्वरूपात करण्यास प्रारंभ झाला असे म्हणता यावे. पुढे वैदिक आर्यांनी ह्या दोन्ही पूजांना आपल्यात सामावून घेत शिव व शक्ती यांच्या उपासनेच्या प्रथा रूढ केल्या.
वेदांमध्ये शिवलिंगाचे वर्णन कुठे येत असल्याचे मला ठाऊक नाही पण रूद्राचे वर्णन मात्र येते. हा रूद्र मूळचा अनार्य. वैदिकांनी तो आपल्यात सामावून घेतला पण आजही कुठेतरी त्याचे मूळचे अनार्य स्वरूप आपल्याला भैरव, वीरभद्र आदी रूपांमध्ये दिसून येते. ह्या रूद्रालाच नंतर शिव समजले जाऊ लागले.
ऋग्वेदात रूद्राचे वर्णन पुढीलप्रमाणे येते.
ऋग्वेद मंडळ १, सूक्त ४३
गाथपतिं मेधपतिं रुद्रं जलाषभेषजम |
तच्छंयोः सुम्नमीमहे ||
यः शुक्र: इव सूर्य: हिरण्यमिव रोचते |
श्रेष्ठ: देवानां वसुः ||
शं नः करत्यर्वते सुगं मेषाय मेष्ये |
नर्भ्यो नारिभ्यो गवे ||
सर्व स्तुतींचा नाथ, सर्व यागांचा स्वामी, व जलौषधींचा प्रभु असा जो रुद्र त्याचेजवळ स्वकल्याणेच्छु भक्त जे धन मागतो, त्याच धनाची आम्ही याचना करतो.
हा देवांचे श्रेष्ठ वैभव असून, ह्याचें तेज देदीप्यमान सूर्याप्रमाणें व कांति सुवर्णाप्रमाणें आहे.
हा आमचा अश्व, आमचा मेंढा, मेंढी, आमचे नोकर, दासी व धेनु ह्यांना उत्तम रीतीने आनंदांत राहतां येईल असे करतो
ऋग्वेद मंडळ २, सूक्त ३३
स्थिरेभिरङगैः पुरुरूप उग्रो बभ्रुः शुक्रेभिः पिपिशेहिरण्यैः |
ईशानादस्य भुवनस्य भूरेर्न वा उ योषद्रु॒द्रादसु॒र्यम् ॥
अर्हन् बिभर्षि सायकानि धन्व अर्हन् निष्कं यजतं विश्व:रूपं ॥
अर्हन् इदं दयसे विश्वं अभ्वं न वै ओजीयः रुद्र त्वत् अस्ति ॥
नानाप्रकारची रूपें धारण करणारा, उग्र व जगाचा आधार अशा भगवान् रुद्राची अंगयष्टि अत्यंत सुदृढ असून त्या आपल्या शुभ्रतेजस व सुवर्ण स्वरुपानेंच तो फार शोभिवंत दिसतो. सर्व भुवनांची समृद्धि, आणि सर्व भुवनांचा प्रभु अशा ह्या भगवान् रुद्रापासून त्याचे ईश्वरी सामर्थ्य दूर झालें असें कधींही होत नाहीं.
तूं हातांत धनुष्यबाण घेतले आहेस ते तुलाच शोभतात, तर्हेतर्हेचे स्वच्छ आणि पवित्र पुष्पहार तू घातलेले आहेस तेही तुलाच शोभतात. हें विश्व येवढें अवाढव्य व भयंकर पण त्याच्यावरही तूं दया करतोस ही थोरवी तुझीच. कारण हे रुद्रा, तेजस्वीपणांत तुझ्यापेक्षां वरचढ असा कोणी आढळणारच नाही.
ऋग्वेद मंडळ ७ सूक्त ४६
मा नः वधीः रुद्र मा परा दाः मा ते भूम प्रऽसितौ हीळितस्य
आ नः भज बर्हिषि जीव:शंसे यूयं पात स्वस्तिऽभिः सदा नः ॥
आम्हाला मारू नको आणि दूर टाकून किंवा परक्यांच्या हातांतही देऊन टाकू नकोस. अथवा आमचा पराभव करू नकोस. तुझ्या क्रोधरूपाच्या पापरूपी बंधनांत आम्ही बद्ध न होऊं. हविचा स्वीकार कर. तुम्ही सदा सुवचनांनी आमचा प्रतिपाळ करा.
नमुन्यादाखल दिलेल्या वरील सूक्तांमध्ये रूद्राचे मूळचे अनार्य स्वरूप त्याच्या क्रोधरूपाने प्रकट होत्सेते दिसते.
रूद्राचे जसे भयानक म्हणून वर्णन आले आहे त्याच प्रमाणे तो भयनाशक अथवा कल्याणकारक असल्याचेही वर्णन ऋग्वेदांत आलेले आहे. जलाषभेषज अथवा जलौषधींचा प्रभू असे रूद्राला मानले गेले आहे. रूद्राला शिवाचे स्वरूप कधी आले ते नेमके सांगता येत नाही मात्र हा बदल वेदोत्तर काळात घडला आणि गुप्तकाळापासून (इ.स.३५०-५००) शिवाला आजचे स्वरूप प्राप्त व्हायला सुरुवात झाली असे म्हणावयास हरकत नाही.
अर्थात हा लिंग,, रूद्र, शिव हा बराच मोठा विषय असून ह्याच्या फारश्या खोलात न जाता आपण आता शिवलिंगे आणि शिवमूर्तींचे मूर्तीशास्त्राच्या दृष्टीने काही प्रकार बघूयात.
शिवलिंगे
शिवलिंगाची रचना सर्वसामान्यपणे शाळुंका अथवा योनी व त्यामध्ये लिंग अशा प्रकारची असते. ह्यालाच सयोनीज शिवलिंग असे म्हणतात. हे आपल्या नेहमीच्या माहितीतले शिवलिंग.
पिंपरी दुमाला येथील यादवकालीन मंदिरातील सयोनीज शिवलिंग.
आता आपण यातील काही भन्नाट प्रकार पाहूयात. यातील काही प्रकार पूर्वीच माझ्या पाटेश्वर मंदिरावरील लेखात आलेलेच होते.
१. एकमुखलिंग
यामध्ये शिवलिंगावर एक मुख कोरलेले असते.
पाटेश्वर येथे अशा प्रकारचे एक शिवलिंग आहे. ह्या एकमुखलिंगाभोवती लहान लहान अयोनीज लिंगांनी फेर धरलेला आहे.
पाटेश्वर येथील एकमुखलिंग
२. चतुर्मुखलिंग
यातील शिवलिंगावर चार मुखे कोरलेली असतात. सर्वसाधारणपणे ही चार मुखे म्हणजे शिवाची चार रूपे असतात. अघोर, उष्णीषिन्. योगी आणि स्त्री.
महाभारतातल्या अनुशासनपर्वातील उमामाहेश्वर संवादानुसार तिलोत्तमा नावाच्या अत्यंत सुंदर अप्सरेला आपल्या भोवती फिरताना पाहून तिच्या फिरण्याच्या दिशेप्रमाणे शंकराला चार मुखे उत्पन्न झाली. तसेच त्यात शंकर पुढे म्हणतो की पूर्वेकडील मुखाने मी इंद्रपद भोगतो, उत्तरेकडील मुखाने मी तुझ्याशी रतीक्रिडा करतो, पश्चिमेकडील मुखाने मी सर्व प्राण्यांना सुख देतो तर दक्षिणेकडील मुखाने मी रौद्र असून त्याद्वारे मी संहार करीत असतो.
तर काही संशोधकांच्या मते ही चार मुखे म्हणजे ब्रह्मा, विष्णू, महेश आणि सूर्य ह्यांची प्रतिके असतात.
पाटेश्वर येतीलच चतुर्मुखलिंग.

३. दिक्पालरूपी शिवलिंग.
हे ही शिवलिंग पाटेश्वर येथीलच आहे. यात शाळुंकेवरील शिवलिंगाभोवती चक्र, चांदणी, बदाम यांच्या आकृत्या आहेत. एकूण दहा चिन्हे यावर कोरलेली आहेत. यातील आठ चिन्हे म्हणजे अष्टदिक्पालांचे प्रतिक असावे तर उरलेली दोन सूर्य आणि विष्णूची प्रतिके असावीत.

४. अष्टोत्तरशत लिंग.
अष्टोत्तरशतलिंगामध्ये सर्वसाधारणपणे मुख्य लिंगावर लहान लहान अशी १०८ अयोनीज शिवलिंगे कोरलेली असतात.
पाटेश्वर येथील अष्टोत्तरशत लिंग
५. सहस्त्रलिंग
सहत्रलिंगांमध्ये सर्वसाधारणपणे मुख्य लिंगावर लहान लहान अशी १००० अयोनीज शिवलिंगे कोरलेली असतात.
पाटेश्वर येथीलच अजून एक सहस्त्रलिंग

६. कोटीलिंग
हा प्रकार पण सहस्त्रलिंगासारखाच पण यातील अयोनीज लिंगांची संख्या हजारापेक्षाही अधिक असते तेव्हा त्याला कोटीलिंग म्हणतात.
पाटेश्वर येथील कोटीलिंग
शिवलिंगांचे ढोबळमानाने काही प्रमुख प्रकार आपण बघितलेच. पाटेश्वरला यापेक्षाही अधिक प्रकारची लिंगे आहेत पण ती याधीही लेखात येऊन गेलेलीच आहेत आणि त्यातील बरीचशी तांत्रिक पंथाशी संबंधित आहेत म्हणूनच आता यावर अधिक काही न लिहिता आपण शिवमूर्तींकडे वळूयात.
यातील बहुतेक शिवमूर्ती वेरूळ येथील लेण्यांत आढळतात. वेरूळ लेण्यांविषयीच्या अधिक माहितीविषयी माझी वेरूळ लेणींविषयीची लेखमाला पाहावी.
शिवमूर्ती
सर्वसाधारणपणे शिवमूर्तींची मांडणी म्हणजे चार हात, हाती डमरू, त्रिशुळ, कमंडलु, अक्षमाला, गळ्यात नाग, वाहन नंदी अशी. पण शिवमूर्तींचेही अनेक प्रकार आहेत त्यातील काही मोजके प्रकार आता येथे बघू.
यातील पहिलीच मूर्ती पाहूयात ती लिंगोद्भव शिवाची.
ही मूर्ती लिंग आणि मूर्ती अशा दोन्ही प्रकारांत गणली जाते.
१. लिंगोद्भव शिव.
एकदा ब्रह्मा आणि विष्णू यांत श्रेष्ठत्वावरून वाद निर्माण झाला. तेव्हा एक दैदिप्यमान अग्निस्तंभ प्रकट झाला. याचा आदी आणि अंत जो शोधून काढेल तो श्रेष्ठ असे ठरले. विष्णू वराहाचे रूप घेऊन पाताळ शोधायला गेला तर ब्रह्माने हंसरूप घेऊन आकाशात मुसंडी मारली. जेव्हा कुणालाही कसलाही थांग लागेना तेव्हा ते दोघेही शिवाला शरण गेले तेव्हा दोघेही आपापल्या परीने श्रेष्ठ आहेत असे सांगून शिवाने लिंगोद्भव स्वरूपात आपले रूप प्रकट केले.
वेरूळ कैलास लेण्यातील लिंगद्भव शिवप्रतिमा
पुण्यातील त्रिशुंड गणेश मंदिरातील लिंगोद्भव प्रतिमा. 
२. लिंगिन शिवमूर्ती
हा एक शिवमूर्तीचा आगळावेगळा प्रकार. सर्वसाधारणपणे ही मूर्ती उमामाहेश्वर प्रकारात दिसते. यात शिवाने शिवलिंग धारण केलेले दिसते. यालाच लिंगायत मूर्ती असेही काहीजण म्हणतात. आजही लिंगायत लोक आपल्याकडे सतत शिवलिंग धारण करत असतात.
उमामाहेश्वर प्रकार (म्हणजे शिव पार्वती यांच्या एकत्रित मूर्ती) यातच अंतर्भूत असल्याने त्याचे वेगळे वर्णन करीत नाही.
वेरूळच्या कैलास लेणीच्या मुख्य प्रवेशद्वारावरील गोपुरावर असणारा हा लिंगिन शिव
वेरूळ कैलास लेणीच्याच प्रदक्षिणापथावर असलेला हा लिंगिन शिव
प्रदक्षिणापथावरच असलेली लिंगिन शिवाची अजून एक प्रतिमा.
ह्याने आपल्या उजव्या हातातील बोटांमध्ये शिवलिंग धारण केले आहे.
३. त्रिमुखी शिव.
ह्याला तीन मुखे असतात. त्रिमुखी शिवाची सर्वात प्रसिद्ध प्रतिमा म्हणजे घारापुरी येथील ब्रह्मा-विष्णू-महेश अशी मानली गेलेली शिवप्रतिमा. वास्तविक ही प्रतिमा ब्रह्मा-विष्णू-महेश अशी नसून शंकराच्याच सदाशिव रूपाची आहे.
वेरूळ येथील त्रिमुखी शिव
४. चतुर्मुख शिव.
ह्याच्या नावाप्रमाणेच ह्याला चार मुखे आहेत. काही संशोधक ह्यालाच सदाशिव (पंचमुखी शिव) असे मानतात ह्याचे पाचवे मुख हे दाखवले नसते व ते आकाशाच्या दिशेने असे मानले जाते.
पाटेश्वर येथील चतुर्मुख शिव

५. लकुलीश शिव
इसवीसनाच्या पहिल्या शतकानंतर व गुप्तकाळाच्या आधी लकुलीश नावाच्या मुनीने पाशुपतमताची स्थापना केली. हे मत ळूहळू मान्य होत जाऊन लकुलीश हा शिवाचेच प्रतिक झाला. ह्याची मुख्य लक्षणे म्हणजे ह्याच्या हातात सोटा अथवा लगूड असते आणि हा उर्ध्वरेता असतो. ह्याचा एक हात नेहमी वरदमुद्रेत असतो. लकुलीश शिवाची मूर्ती पद्मासनी अथवा उभ्या अशा दोन्ही प्रकारांत सापडते.
वेरूळ लेणी क्र. २९ मधील पद्मासनस्थ लकुलीश शिवाची मूर्ती
वेरूळ कैलास लेणीतील (लेणी. क्र. १६) उभ्या अवस्थेतील उर्ध्वरेता लकुलीश
६. अजएकपाद शिव
हा शंकराच्या मूर्तीचा एक अतिशय दुमिळ प्रकार. महाभारतात वर्णिल्याप्रमाणे हा रूद्र कुबेराबरोबरच धनाचे रक्षण करत असतो. याचे तोड बकर्याचे असल्याने हा अग्नीशी समान मानला जातो तर ह्याने आपले संतुलन एकाच पायांवर खुबीने साधलेले असते.
पाटेश्वर येथील अजएकपादाची दुर्मिळ प्रतिमा

७. नटराज शिव अथवा नृत्य मूर्ती
हा एक सर्वपरिचीत प्रकार. नटराज प्रकारात शिव हा नृत्यमुद्रेत दिसतो. शिवाने १०८ प्रकारे नृत्य केले अशी मान्यता आहे. तांडवनृत्यसुद्धा ह्या नटराज प्रकारातच येते.
नटराज शक्यतो चारापेक्षा अधिक हातांचा दर्शवला जातो. ८, १०, १६ हातांचेही नटराज आहेत. हातांमध्ये त्याने खङग, शक्ती, दंड, त्रिशुल, नाग, ज्वाला इत्यादी आयुधे धारण केलेली असतात.
वेरूळ लेणी क्र. २१ रामेश्वर येथील कटीसमनृत्यमुद्रेत असलेली शिवप्रतिमा
वेरूळ लेणी क्र. १६ येथील शिवतांडव प्रतिमा
८. कल्याणसुंदर मूर्ती
शिवपार्वती विवाहाचे अंकन दाखवणार्या मूर्तीस कल्याणसुंदर मूर्ती म्हणतात. ह्या मूर्तींमध्ये शिवाने पार्वतीचा हात आपल्या हाती घेतलेला असतो. ब्रह्मदेव हा भटाचे काम करत असतो तर दिक्पाल, विष्णू आदी देव शिवाच्या विवाहाप्रित्यर्थ आलेले असतात.
वेरूळ लेणी क्र. २९ मधली कल्याणसुंदर मूर्ती
वेरूळ लेणी क्र. २१ मधली कल्याणसुंदर मूर्ती
९. सोमास्कंदमूर्ती
या मूर्तीमध्ये शिव आणि पार्वती यांचे मध्ये लहानसा स्कंद अथवा कार्तिकेय असतो.. अर्थात स उमा स्कंद (उमेसहित स्कंद) तो उभा, बसलेला किंवा आईच्या किंवा बाबांच्या मांडीवरही दाखवला जातो.
वेरूळ कैलास लेणीमंदिराच्या अंतराळात सोमास्कंद मूर्ती कोरलेली आहे.
आतापर्यंत आपण उमामाहेश्वर आणि केवल शिव प्रकारच्या मूर्ती पाहिल्या आता शिवाच्या मूर्तींचे अजून काही प्रकार बघू.
यात येतात ते अनुग्रह आणि संहारमूर्ती
सुरुवातीस अनुग्रहमूर्ती पाहूयात.
१०. अनुग्रहमूर्ती
अनुग्रहमूर्ती म्हणजे शंकराच्या वरप्रदानास अथवा अनुग्रहास प्राप्त झालेल्या व्यक्तिची कथा.
ह्यात रावणानुग्रह आणि मार्केंडेयानुग्रह असे दोन उपप्रकार येतात.
१०.१ रावणानुग्रहशिवमूर्ती
कुबेराचा पराभव करून त्याचे पुष्पक विमान पळवून रावण कैलासपर्वतावर शंकराचे दर्शन घेण्यास येतो. शिवपार्वतीची क्रिडा चालू असल्याने द्वारपालांनी हाकलून दिलेला गर्वोन्मत्त रावण कैलास पर्वतच उचलण्याचा बेत करतो. आपल्या सर्व हातांनी कैलास पर्वत तळापासून उचलायला लागतो. तर शंकर मात्र भयभीत पार्वतीला आणि भेदरलेल्या शिवगणांना धीर देऊन आपल्या पायाच्या अंगठ्याने कैलासास दाबून धरतो. कैलासाच्या ओझ्याखाली चिरडत चाललेला रावण प्राणांची भीक मागून शिवस्तुती गाऊन शंकराचा अनुग्रह प्राप्त करून घेतो अशी याची थोडक्यात कथा.
वेरूळच्या कैलास लेणीत रावणानुग्रहाचे अतिशय अप्रतिम शिल्प आहे.
शिल्पपटात कैलास पर्वत उठावात कोरलेला आहे तर त्याच्या खालच्या भागात खोबणी करून त्यात रावणाचे शिल्प कोरलेले आहे. रावणाची मस्तके सुटी आहेत. कैलास उचलताना रावणाने एक पाय गुडघ्यात मुडपून दुसरा पाय जमिनीवर घट्ट रोविला आहे. आपल्या वीस हातांनी सर्व शक्ती पणास लावून त्याने कैलास अर्धवट उचललेला आहे. इतकी प्रचंड ताकत पणास लावताना साहजिकच रावणाची मान तिरकी झालेली असून कानातले एक कुंडल खांद्यावर टेकलेले आहे तर दुसरे कुंडल हवेत झुलत आहे. कैलास पर्वतावरील घनदाट वनराजी त्यावर झाडे आणि त्यावरील भयभीत मर्कटे कोरून दाखवली आहे. वृक्षराजीच्या वर भयभीत शिवगण तर शेजारी दोन द्वारपाल कोरलेले आहेत. पार्वतीच्या शेजारी असलेली एक दासी पाठमोरी होऊन पळून जात आहे. तर भयभीत पार्वतीला निर्विकार शंकर धीर देत असून एका पायाने कैलास दाबून धरत आहे. आकाशात अष्टदिक्पाल रावणाचे हे गर्वहरण पाहावयास जमले आहेत.
वेरूळ लेणी क्र २९ मधील रावणानुग्रहशिवमूर्ती
वेरूळ लेणी क्र. २१ (रामेश्वर) येथील रावणानुग्रहशिवमूर्ती. लक्ष्यपूर्वक पाहिल्यास रावणाचे दहावे मुख हे गर्दभाचे असल्याचे दिसेल.
गोंदेश्वर मंदिर, सिन्नर येथील बाह्यभिंतीवर कोरलेली रावणानुग्रहशिवमूर्ती
१०.२ रावणानुग्रहशिवमूर्ती प्रकार दुसरा
रावणानुग्रहशिवमूर्तीचा अजून एक प्रकार वेरूळ येथील कैलास लेणीच्या प्रदक्षिणापथावर पाहावयास मिळतो. या कथेप्रमाणे वरप्राप्तीसाठी रावण दहा हजार वर्षे तप करतो प्रत्येक सहस्त्र वर्षानंतर आपले एकेक मस्तक कापून शंकराला अर्पण करतो जेव्हा शेवटी आपले शेवटचे मस्तक कापून देण्यास सिद्ध होतो तेव्हा भगवान शंकर प्रकट होऊन त्याला वर प्रदान करतात.
अर्थात यातील गंमत म्हणजे ही कथा आहे मूळची ब्रह्मदेवासंदर्भात. वाल्मिकी रामायणाप्रमाणे रावण हा ब्रह्मदेवाला मस्तके अर्पण करून वरप्राप्ती करून घेतो. तर येथे मात्र शिवाची कथा कोरलेली आहे. एकंदरीतच वैदिक देवता विस्मृतीत जात असताना शैव, वैष्णव पंथांचे प्राबल्य कसे वाढायला लागले होते याचा हा एकप्रकारे पुरावाच.
मूळ वाल्मिकीरामायणातील श्लोक पहा.
दशवर्षसहस्रं तु निराहारो दशाननः ।
पूर्णे वर्षसहस्रे तु शिरश्चाग्नौ जुहाव सः ||
एवं वर्षसहस्राणि नव तस्यातिचक्रमुः ।
शिरांसि नव चाप्यस्य प्रविष्टानि हुताशनम् ॥
अथ वर्षसहस्रे तु दशमे दशमं शिरः ।
छेत्तुकामे दशग्रीवे प्राप्तस्तत्र पितामहः ॥
पितामहस्तु सुप्रीतः सार्धं देवैरुपस्थितः ।
तव तावद् दशग्रीव प्रीतोऽस्मीत्यभ्यभाषत ॥
शीघ्रं वरय धर्मज्ञ वरो यस्तेऽभिकाङ्क्षितः ।
कं ते कामं करोम्यद्य न वृथा ते परिश्रमः ॥
कथेचा थोडक्यात आशय वर दिलाच असल्याने आता याचे परत भाषांतर करीत नाही.
वेरूळ येथील कैलास लेणीतील प्रदक्षिणापथावरील रावणानुग्रहशिवमूर्ती
१०.३ मार्कंडेयानुग्रहमूर्ती
अनुग्रहमूर्तीचाच पुढचा प्रकार म्हणजे मार्कंडेयानुग्रहशिवमूर्ती. अर्थात हीच मूर्ती शिवाच्या संहारमूर्तीमध्येही गणली जात असल्याने हिच्याबद्दल अधिक उहापोह मी पुढील संहारमूर्ती प्रकरणात करतो.
११. संहारमूर्ती.
ह्या मूर्तीचे शिवाचे संहाररूप अथवा रौद्ररूप दाखवतात. सज्जनांच्या रक्षणासाठी, असुरांच्या नाशासाठी शिवाने रौद्ररूप धारण करून त्यांचा संहार केला. ह्या सर्व कथा संहारमूर्तींमध्ये कोरलेल्या असतात. संहारमूर्तींमध्येच भैरवाचाही समावेश आहे पण आपण भैरवमूर्ती नंतर एका स्वतंत्र प्रकरणात पाहूयात.
संहारमूर्तीमध्ये पहिली मूर्ती घेऊ ती म्हणजे कालारी शिव अथवा मार्कंडेयानुग्रहमूर्ती
११.१ कालारी शिव अथवा मार्कंडेयानुग्रहशिवमूर्ती.
ह्या मूर्तीचा समावेश एकाचवेळी अनुग्रह आणि संहार अशा दोन्ही प्रकारांमध्ये होतो याचे कारण म्हणजे मार्कंडेयावर अनुग्रह करून शिव साक्षात कालरूपी यमाचे पारिपत्य करीत आहे.
याची थोडक्यात कथा अशी.
पुराणकथेप्रमाणे निपुत्रिक असलेल्या मर्कंड ऋषींच्या तपश्चर्येमुळे प्रसन्न होऊन शंकर त्यांना अतिशय विद्वान पुत्र होईल असा आशिर्वाद देतो. मर्कंडाचा हा अल्पायुषी पुत्र शिवाच्या उपासनेत गढून जातो. मार्कंडेय १६ वर्षाचा होतो तेव्हा त्याचे प्राण हरण करायला खुद्द यम तिथे येतो. प्रार्थनेत गढलेल्या मार्कंडेयाच्या गळ्यात यम आपला यमपाश आवळतो. मार्कंडेयासारख्या भक्ताला यम ओढून नेत आहे हे शिवाला सहन न होऊन तो पिंडीतून प्रकट होऊन साक्षात यमधर्मावर क्रोधाने लत्ताप्रहार करून त्याला दूर ढकलून देतो. भयभीत यम शंकराची प्रार्थना करून त्याजकडे अभयदान मागत आहे. यमधर्मरूपी साक्षात कालाचे पारिपत्य करून मार्कंडेयाला जीवदान दिल्याने शिवाच्या ह्या रूपाला कालारी शिव अथवा कालांतक शिव असेही म्हटले जाते.
वेरूळ येथील कैलास लेणीच्या प्रदक्षिणापथावर असलेली कालारी शिव प्रतिमा
वेरूळ येथील कैलास लेणीमधील कालारी शिवप्रतिमा
११.२ व ११.३ गजासुरसंहारमूर्ती आणि अधकासुरवधमूर्ती
ह्या दोन्ही मूर्तीबाबत एकच कथा आहे.
अंधक नावाच्या असुराला ब्रह्मदेवाच्या वराने आपल्या जमिनीवर पडणार्या रक्ताच्या प्रत्येक थेंबापासून एकेक असुर निर्माण होईल अशी शक्ती प्राप्त होते. अंधकासुराच्या प्रभावाने हैराण झालेले देव शंकराकडे अभय मागण्यासाठी जातात त्याच वेळी नीलासुर नावाचा राक्षस हत्तीचे रूप धारण करून शंकराचे पूजन करणार्या ऋषींना त्रास देतो. शंकर आधी गजासुराचा वध करून त्याच एक दात उपटतो आणि त्यानंतर त्याचे गजचर्म अंगाभोवती गुंडाळून एका हाती वाडगा धरून त्रिशुळाने अंधकासुराचा वध करतो. आपल्या त्रिशुळावर उचलून धरलेल्या अंधकाचे रक्त वाडग्यात गोळा करतो तसेच वाडग्याबाहेर पडणारे रक्ताचे चुकार थेंब त्वरेने शोषून घेण्यासाठी आपल्या योगसामर्थ्याने मातृकेची (चामुंडेची) उत्पत्ती करतो.
वेरूळच्या कैलास लेणीतील गजासुरवधाची ही मूर्ती
वेरूळच्या लेणी क्र. २९ मधील अंधकासुरवधाचे हे अतिशय प्रत्ययकारी शिल्प. पहा शिवाचे डोळे कसे भयानक क्रोधाने खोबणीतून पार बाहेर आलेले आहेत.
कैलास लेणीतील प्रदक्षिणापथावरील अंधकासुरवधाचे अजून एक शिल्प
११.४ त्रिपुरांतकशिवमूर्ती
तारकासुराचे तीन मुले विद्युन्माली, तारकाक्ष आणि कमलाक्ष यांनी ब्रह्मदेवाची आराधना करून आकाशगामी असलेली अनुक्रमे सुवर्ण, रौप्य आणि लोहमय अशी तीन फिरती पुरे प्राप्त करून घेतली. ही तिन्ही पुरे एकाच रेषेत असतांनाच एकाच बाणाने ह्यांचा विध्वंस करू शकणाराच त्रिपुराचा वध करू शकेल असा वर त्यांनी मिळविला. तीन फिरत्या पुरांमुळे अतिशय बलवान झाएल्या ह्या तीन्ही असुरांचा शंकराने विष्णूरूपी बाण करून त्यांचा नाश केला अशी ही थोडक्यात कथा.
वेरूळ येथील प्रदक्षिणापथावरील त्रिपुरांतक शिवमूर्ती.
सप्तस्वरमयशिव
https://bhatakbhavani4216.wordpress.com/2020/12/11/%e0%a4%b8%e0%a4%aa%e0%a5%8d%e0%a4%a4%e0%a4%b8%e0%a5%8d%e0%a4%b5%e0%a4%b0%e0%a4%ae%e0%a4%af%e0%a4%b6%e0%a4%bf%e0%a4%b5/
December 11, 2020Posted inUncategorizedआधुनिकतेच्या शिखरावर असलेली मुंबई तेवढीच प्राचीन सुद्धा आहे. याच मुंबईच हृदय समजला जाणाऱ्या परिसरात म्हणजेच परळ गावात एक प्राचीन शिवमूर्ती आहे. परळ गावातील #चण्डिकादेवी किंवा बारदेवीच्या मंदिराच्या शेजारीच ही मूर्ती आहे. १९३१ मध्ये रस्त्याचे बांधकाम चालू असताना सापडलेली ही मूर्ती स्थानिकांच्या हट्टामुळे (अर्थात चांगलंच आहे) आजही इथेच आहे. पुरातत्व विभागाच्या माहिती प्रमाणे ही मूर्ती गुप्त कालीन म्हणजेच इसवी सनाच्या पाचव्या किंवा सहाव्या शतकातील असावी.
.
जवळपास १३७ इंच उंचीची ही मूर्ती ७७ इंच रुंदीच्या भागावर उठावशीर कोरलेली आहे. मध्यभागी मुख्य प्रतिमा, तिच्या डोक्यावर एकावर एक अश्या दोन मूर्ती तर मुख्य मूर्तीच्या खांद्यातून दोन मूर्ती, आणि त्या वरील मूर्तीच्या खांद्यावरून दोन मूर्ती त्रिभंगावस्थेत अश्या एकूण सात मूर्ती नजरेला पडतात. मुख्य मूर्तीच्या पायाजवळ एकूण पाच वादक बसलेले आहेत.
सात पैकी सहा मूर्ती ह्या द्विभुज असून, या मूर्तीच्या डाव्या हातात एक हातात कमंडलू आणि दुसरा हात मुद्रा अवस्थेत आहेत. मध्यभागी सर्वात वरची मूर्ती मात्र दहा हातांची आहे. या मूर्तीच्या उजव्या हातात हातात कमंडलू, चक्र, खेटक, तलवार, आणि एक हात मुद्रा अवस्थेत आहे, तर डाव्या बाजूला एक हात अभिषेक मुद्रेत असून इतर हातात धनुष्य, दोन भरीव चक्र आणि एका हातात कमंडलू आहे.
एकाही मूर्तीवर मुकुट नसला तरी केसांची जटामुकुट सारखी अतिशय सुंदर आणि वेगळी रचना, डोक्यावर चंद्रकोर, गळ्यात हार, नक्षीदार कटीवस्त्र,कानातील कुंडल, हातात कडे, यांनी युक्त ह्या मूर्ती अतिशय सुंदर दिसतात.
काही अभ्यासकांच्या मते मधल्या तीन मूर्ती म्हणजे तमोगुणी शिव, सत्वगुणी विष्णू, आणि राजस ब्रह्मा असावा, तर इतर चार मूर्ती ह्या सद्योजात, वामदेव, अघोर, आणि तात्पुरुष असावेत. तर काहींच्या मते मधल्या मूर्ती ह्या पाश, पशु आणि पती असावे तर इतर प्रतिमा या विद्या, क्रिया, योग आणि चर्या हे शिवसिद्धांताचे लक्षण असावेत.
सी शिवरामन या मूर्तीला शिवाची सप्तस्वरमय मूर्ती असे म्हणलेले आहे, मात्र मुख्य प्रतिमेपैकी कोणाकडेही कोणतेही वाद्य नसल्याने हा विचार विवादित आहे. तर पायाजवळ बसलेले वादक हेच शिवाच्या सप्तस्वरमय रुपाकडे संकेत करीत आहेत, त्यामुळं सुरांशी मेळ घातला जाऊ शकतो असेही काहींचे म्हणणे आहे.
महेश तानाजी देसाई
#भ्रमणगाथा

गुड्डीमल्लमचे शिवलिंग
शिव ते महादेव - सांस्कृतिक प्रवाह
कृष्ण आणि पुतना
लेख - १५
कृष्ण हे भारतीय धार्मिक परंपरेमध्ये असलेले असे चरित्र आहे ज्याने सर्वांना त्याच्या कथांमध्ये बांधून ठेवले आहे. बाळकृष्ण, यशोदेला प्रश्न विचारून भंडावून सोडणारा कृष्ण, गोपिकांबरोबर खेळणारा कान्हा, कंस वध करणारा जबाबदार तरुण कृष्ण आणि महाभारतात अर्जुनाचा सारथी होऊन आयुष्याचे आणि या सृष्टीचे तत्वज्ञान गीतेत संगणारा, विश्र्वरूप दर्शन देणारा भगवान श्रीकृष्ण. अशा अनेक वेगवेगळ्या रूपांमध्ये तो आपल्याला दिसतो. वेगवेगळ्या कलांमध्ये देखील कृष्णाची ही रूपं आपल्याला बघायला मिळतात. कृष्ण चरित्रतला महत्त्वाचा भाग म्हणजे त्याने बाळ असताना केलेला अनेक असुरांचा वध.
पुतना नावाच्या एका राक्षसिणीला कृष्णाचा वध करायला कंस मामाने पाठवले. आपल्या स्तनांना विषाने भरून ती यशोदेच्या घरात रूप बदलून आली. योग्य संधी साधून तिने कृष्णाला स्तनपान करायला घेतले. पण शेवटी दैवी अवतार असलेल्या कृष्णाने तिचे हे रूप ओळखून तिचा वध केला अशी ही कथा आहे.
मध्य प्रदेशात विदिशा जवळ बिजा मण्डल नावाचे एक प्रचंड मोठे पण भग्न मंदिर आहे. त्या मंदिराच्या एका खांबावर हे छोटेसे शिल्पं आहे. यामध्ये एक स्त्री आपल्या मांडीवर घेऊन त्या बाळाला स्तनपान करते आहे. स्तनपान हे मातृत्वाचे महत्त्वाचे लक्षण आहे. आपल्या बाळाला जवळ घेऊन, घट्ट पकडून ही क्रिया होते. पण या शिल्पामध्ये त्या स्त्री ने बाळाला स्तनपान देताना देखील आपले दोन्ही हात हे वर घेतले आहेत आणि हाच फरक आहे कलाकाराने दाखवला आहे.
एवढ्याश्या शिल्पातून एवढी मोठी कथा दाखवणाऱ्या कलाकाराचे कसब किती अगाध असेल याची आपण कल्पनाच केलेली बरी. कृष्ण आणि अनुषंगाने वैशव प्रभाव भारतात मोठ्या प्रमाणात वाढण्यात भारतीय कलांचे योगदान खूप मोठे आहे.
शिल्प - कृष्ण आणि पुटना
बिजा मण्डल, मध्य प्रदेश
९ वे शतक
इंद्रनील सदानंद बंकापुरे
कोल्हापूर
9960936474
शिव
लेख - २
शंकर किंवा शिव हा भारतात पुजल्या जाणाऱ्या महत्वाच्या देवतांपैकी एक अत्यंत महत्त्वाचा देव. या शंकराचे मूळ काही हजार वर्ष मागे जाते. अतिप्राचीन कालखंडात लिंग रूपाने पूजन होणारा देव, जनन आणि पुनर्निर्मिती दाखवणारा देव, वेदांमध्ये दिसणारा रुद्र, महायोगी शिव, सगळं काही आपल्या क्रोधाने नष्ट करणारा प्रलय आणि त्याच वेळेला परम भक्ताच्या मागण्या पूर्ण करणारा शिव, अशा शेकडो छटा या महादेवाच्या आहेत. स्मशानात अंगाला राख फासून राहणाऱ्या साधुंपासून ते तलम वस्त्र घालून राजवाड्यात राहणाऱ्या राजापर्यंत सगळ्यांना याने आपल्यात सामावून घेतले आहे. मंदिराच्या गर्भ गृहात प्रामुख्याने लिंग स्वरूपात याचे पूजन होत असेल तरीही शिल्पशास्त्रात शंकर या संकल्पनेवर मोठ्या प्रमाणात प्रयोग झाले आहेत.
शंकराच्या शिल्पामध्ये काही प्रमुख गोष्टी आपल्याला बघायला मिळतात. डोक्यावर असलेल्या जटा किंवा जटा मुकुट, कपाळावर कोरलेला तिसरा डोळा, हातात पकडलेला त्रिशूळ, शिवाला अत्यंत प्रिय असलेले वाद्य म्हणजेच डमरू, इत्यादी लांच्छने बघून शिवाचे शिल्प ओळखता येते.
आता या फोटोमध्ये असलेल्या शिवाचे निरीक्षण करूयात. आधी सांगितल्याप्रमाणे डावीकडून उजवीकडे असे निरीक्षण करायचे आहे. मूर्ती स्थानक म्हणजेच उभी आहे, हातामध्ये पकडलेला त्रिशूळ आणि त्या दंडाला खाली वेटोळे दिलेला नाग, कमरेवर नेसलेले वाघाचे कातडे (गुडघ्याजवळ वाघाचे तोंड दिसेल), डोक्यावर असलेला जटा मुकुट, पाठीमागे कोरलेली प्रभावळ किंवा वलय हे त्याच्या दैवत्वाचा पुरावा देतात.
लिंगपुराण, शिवपुराण, इत्यादी पुराणांमध्ये शंकराच्या कथा आपल्याला वाचायला मिळतात. वेदांमध्ये छोट्या प्रमाणात दिसणारा रुद्र ते पौराणिक कालखंडात प्रमुख देव म्हणून दिसणारा शिव हा प्रवास खरंच अद्भुत आहे.
मूर्ती - केवल शिव, छत्रपती शिवाजी महाराज वास्तू संग्रहालय, मुंबई
इंद्रनील सदानंद बंकापुरे
कोल्हापूर
9960936474
आता संहारमूर्तीपैकीच एक असलेल्या शिवाच्या भैरवरूपाबाबत आपण पाहू.
१२. भैरव
भैरव हे शंकराचे पूर्ण रूप होय. तो सर्व जगाचे भरण करतो आणि रूपाने भीषण आहे म्हणूनच ह्या रूपाला भैरवरूप असे म्हणतात. भैरवमूर्ती महाराष्ट्रात बहुतेक ठिकाणी आढळतात. साक्षात यमरूपी काळही त्याला घाबरून असतो म्हणून त्याला काळभैरव असेही संबोधले जाते.
बटबटीत डोळे, ओठांतून बाहेर पडणारे दात, गळ्यात नरमुंडमाला, त्रिशुळावर किंवा हातात नरमुंड लटकावलेले, नरमुंडातील गळणारे रक्त चाटणारे एक किंवा अधिक कुत्रे (भैरवाचे वाहन्ही कुत्राच आहे), सर्परूपी दागिने ही भैरवाची प्रमुख वैशिष्ट्ये. भैरवमूर्ती बरेचदा नग्नावस्थेतही दाखवलेल्या असतात.
भैरवाबाबतची कथा अशी-
ब्रह्मदेवाने रूद्र उत्पन्न केला आणि त्याला कपालि या नावाने संबोधून पृथ्वीचे रक्षण कराण्यास सांगितले. या नावामुळे स्वतःचा अपमान झाल्याचे वाटून रूद्राने आपल्या डाव्या हाताच्या अंगठ्याच्या नखाने ब्रह्माचे पाचवे मस्तक तोडून त्याला चतुर्मख केला. तथापि ते मस्तक त्याच्या हाताला चिकटून राहिले. ह्यापासून मुक्त होण्यासाठी ब्रह्मदेवाने त्याला १० वर्षे कापालिक व्रत करण्यास सांगितले. रूद्राने केसाचे जानवे आणि अस्थींचा हार घातला. जटामुकुटावर नरमुंड ठेवले व हातात रक्ताने भरलेले कपाल घेऊन तीर्थाटन केले व काशीस त्याच्या अंगठ्यास चिकटलेले मस्तक गळून तो मुक्त झाला.
शंकराच्या ह्या रूपालाच भैरवरूप म्हटले जाते.
भैरवमूर्तींचे असंख्य प्रकार आहेत. कोकणात आढळणार्या वेताळ मूर्ती म्हणजे असितांग भैरवाचाच एक प्रकार.
सामान्य, क्षेत्रपाल, चंड, स्वच्छंद, स्वणाकर्षण, आसितांग्, बटुक, कापाल, भीषण, घोर असे भैरवाचे विविध प्रकार.
वेरूळ येथील लेणी क्र. २१ येथील असितांग भैरव.
खिद्रापूरच्या कोपेश्वर मंदिराच्या बाह्यभिंतीवर कोरलेली भैरवमूर्ती.
खिद्रापूर येथीलच गजारूढ भैरव
गोंदेश्वर मंदिर, सिन्नर येथील भैरवमूर्ती
भुलेश्वर मंदिर, पुणे येथील उजवीकडील दोन भैरवमूर्ती

पूरच्या कुकडेश्वर मंदिरावरील भैरव प्रतिमा

रांजणगावाजवळील पिंपरी दुमाला येथील दुर्लक्षित मंदिराच्या बाह्यभागावरील ही भैरव प्रतिमा

पेडगाव येथील अप्रतिम शिल्पकेलेने समृद्ध असलेल्या लक्ष्मीनारायण मंदिराच्या बाह्यभिंतीवरील भैरव मूर्ती
भैरव प्रतिमा पाहून झाल्यावर मी आता इशाण प्रतिमांकडे वळून लेखाचा समारोप करतो.
१३. इशण
हा अष्टदिक्पालांपैकी एक. इंद्र, अग्नी, वायु, वरूण, कुबेर, यम, निऋती आणि इशान्य दिशेचा पालन करणारा हा लोकपाल म्हणजे इशण अथवा इषान. हे शिवाचेच एक रूप. ह्याची लक्षणे सर्वसामान्यपणे शंकराचीच असतात. म्हणजे त्रिशुळ, डमरू वगैरे.
पेडगाव येथील अप्रतिम शिल्पकेलेने समृद्ध असलेल्या लक्ष्मीनारायण मंदिराच्या बाह्यभिंतीवरील ही इशण मूर्ती
टोके गाव, प्रवरासंगम येथील सिद्धेश्वर मंदिरातील विष्णू उपमंदिरावरील ही इशण मूर्ती
आतापर्यंत आपण काही प्रकारची शिवलिंगे तर बर्याच प्रकारच्या शिवप्रतिमा पाहिल्या. यातले बरेचसे प्रकार उदा. दक्षिणामूर्ती, भिक्षाटनमूर्ती, चंद्रशेखरमूर्ती, गंगाधरमूर्ती, वीरभद्र आदिंची छायाचित्रे माझ्याजवळ नसल्याने इथे द्यायच्या राहून गेल्यात. जर कुणाजवळ तशा मूर्तीची छायाचित्रे अथवा वर्णन असेल तर ते येथे अवश्य द्यावेत.
पुढेमागे क्वचित विष्णू, दिक्पाल, मातृका यांवरही लिहिण्याचा विचार आहे. बघू कधी आणि कसे जमते ते.
लकुलिश, भैरव, एकपाद अज आणि बाकी तीनचार फॉर्म हे एकदम वेगळे वाटले. सहस्रलिंग व कोटिलिंग हे जबरीच आहे. शिल्पांबद्दल म्हणायचे तर वेरूळची शिल्पे सर्वांत जबराट वाटली.

हा फोटो मी बागडोगराला असलेल्या BSF च्या वसाहतीमध्ये असलेल्या मंदिरातून घेतला आहे. हे मंदिर जनतेसाठीपण खुले आहे. मंदिराच्या परिसरातून पाय हलत नव्हता. इतका छान निसर्ग की........................ बस्स........!!!
इतकी शांतता की............. फक्त शांततेचाच आवाज येत होता.
बाप्पा, आईबाबांच्या मांडीवर न बसता पुढ्यात बसले आहेत. आणि बाप्पाच्या पुढ्यात, खड्ड्यामध्ये शिवलिंग आहे....
मित्र विवेक चौधरींनी कांचीपुरमच्या कांची-कामाक्षी मंदिरातील एका खांबावरील दक्षिणामुर्ती शिवांची शिल्पमुद्रेचा फोटो काढला होता तो सादर.

दक्षिण भारतात शिवाच्या रुपात ते विविध कला व ज्ञानाचे गुरू मानले जातात. त्यांचे तोंड दक्षिण (यम) दिशेला असून वडाच्या झाडाखाली ते एक पाय मांडीवर घेऊन आसनस्थ आहेत. त्यांच्या सोबत अनेक विषयाचे विचारक व साधक ज्ञान प्राप्तीसाठी दाटीने मिळेल त्या दगडाधोंड्यांवर बसून विचारविनिमय करताना दिसतात. कधी कधी नंदी बाजूला ते निरखनाता दिसतो. उजव्यापायांच्या खाली एका बुटक्या अपस्मार नावाच्या दैत्याला शिवांनी त्याने अज्ञान, संशय व दुर्मतीला पायाने दाबून धरलेले आहे असे मानले जाते. या रूपात शिव चार हाताचे असून एका मागच्या हातात धगधगता अग्नी वा मशाल तर दुसऱ्या हाती जपमाला तर कधी ताडपत्रांची चवड, धरलेली दिसते. काही ठिकाणी ते वीणावादन करताना किंवा वीणा बाजून ठेवलेली असे दिसतात. उजवा हात इथे त्यांनी आपल्या हृदयाला उजव्या बाजूला असल्याचा संकेत करताना दिसतो.
या चित्रात उजवा खालचा हात कर्तरिमुद्रेत तर डावा वरदमुद्रेत दिसतो. कर्तरी मुद्रा ज्ञान मुद्रेसमान असावी. पैकी तीन उघडलेली बोटे गर्व, दुष्कृत्य व स्वतः बद्दलची भ्रामक वा आभासी समजूत यांच्यापासून दूर अंगठा म्हणजे शिवतत्व आणि तर्जनी म्हणजे जीव तत्व यांचे एकत्र येणे असे मानले जाते.

या मंदिरातील आणखी एक मुर्ती श्वानवाहन कालभैरवाची आहे. यावर आणखी प्रकाश टाकला जावा ही विनंती.
भारतीय मूर्तीशास्त्र हे डॉ. नी. पु. जोशींचे पुस्तक सुरेख आहे पण अतिशय संक्षिप्त माहिती आहे.
दक्षिणामूर्ती शिवाचे वर्णन खासच. ही अशी एक मूर्ती बहुधा वेरूळ येथे आहे. पण माझ्या नजरेतून मात्र निसटली.
शेवटची मूर्ती पण जबरी. मस्तकी अग्नीज्वाळांसारखे उभे राहिलेले केस हे पण भैरवाचे एक लक्षण आहे.
लिंग,, रूद्र, शिव हा बराच मोठा विषय असून ह्याच्या फारश्या खोलात न जाता आपण आता शिवलिंगे आणि शिवमूर्तींचे मूर्तीशास्त्राच्या दृष्टीने काही प्रकार बघूयात.
या वाक्यासाठी टाळ्या. लेख मुद्देसूद कसा लिहावा आणि होणारी पुढील चर्चा अपेक्षित चौकटीत कशी राहील याचा एक उत्तम आदर्श म्हणता येईल असे हे वाक्य आहे. !
पण लिंगपूजेविषयी वेदांमध्ये (किमान ऋग्वेदात) माहिती नाहिये. कारण तू म्हणतो तसे काळाच्या ओघात रुद्राचे पुढे शिवात रुपांतर केले गेले. पण रुद्र ही अनार्य देवता माझ्यामते नव्हती. कारण ऋग्वेदांत रुद्राचे उल्लेख आहेत त्यावरुन ती वैदिक देवता आहे हे मान्य करण्यास हरकत नसावी. अर्थात ऋग्वेदांत वेळोवेळी भर पडलेली आहे. रुद्राचा उल्लेख नंतर जोडला गेला आहे किंवा कसे याबद्दल मात्र मला कल्पना नाही. ही बाब अभ्यासकांवर सोडूयात.
३. दिक्पालरूपी शिवलिंग.
यामध्ये तू निदर्शित आणून दिलेल्या चिन्हांमुळेच हे शिवलिंग दिक्पालांचे आहे हे सिद्ध होते. तुझा तर्क योग्यच आहे.
सहस्त्र व कोटी लिंगेही आवडलीत. हजार पेक्षा जास्त अयोनिज लिंगाला कोटीलिंग म्हणणे सयुक्तीक ठरते कारण प्रत्यक्ष १ कोटी अयोनिज लिंगे कोरणे कारागिरांच्या वेळेचा अपव्यय आणि अशक्य"कोटी"तही आहे.
मूर्तींकडे वळताच पहिल्या ६ मूर्त्या पाहून एक क्षण माझ्या आवडत्या नटराजाचा विसर पडला होता. प्रत्येक लिंग व मूर्तीच्या ओघाने दिलेली माहिती सुंदर आहे. शेवटी आधीच्या वेरुळ मालिकेत पाहिलेला माझा आवडता नटराज ७ क्रमांकावर दिसला आणि अधिकच आनंद झाला.
शिवाने नुसते १०८ मुद्रांमध्ये नृत्य केले अशी मान्यताच नाही तर शिवाला नृत्यकलेचा उद्गाताही मानले जाते. शास्त्रशुद्ध पद्धतीने नृत्य शिकण्यासाठी शिवाची आराधना त्यासाठीच केली जाते. मलाही ही माहिती सुदैवाने अलिकडेच वाचल्यामुळे कळाली.
१०.१ रावणानुग्रहशिवमूर्ती च्या ओघाने आलेली कथा ज्ञानात छान भर टाकते आहेच शिवाय मूर्तिचे विश्लेषणही चित्तवेधक आहे.
संहारमूर्ती नावाप्रमाणेच साजेश्या आहेत. त्यातली अंधकासुरवधाची संहारमूर्ति तुझ्या वेरुळच्या लेखात आधी पाहिली होती. ती खरोखर संहारक दिसते.
भैरवावर संक्षेपाने पण नेमकी माहिती तू दिली आहेस.
अधिक माहितीसाठी - भैरवावर रा.चिं.ढेरे यांनी लज्जागौरी ग्रंथात बरेच सुंदरपणे सांगितले आहे. मातृकांवरही त्यातच विपुल लेखन आहे. ते तू वाचले असशीलच. पण पुढील लेखनासाठी संदर्भ तपासून बघण्यासाठी नक्कीच उपयोग होईल.
दिक्पालांवर तुझ्या लेखाची मात्र प्रतिक्षा करतो आहे. दिक् पाल तू आधी लिही असा आग्रह करु इच्छितो. कारण दिक् पालांचे दिशांवर नियंत्रण असल्याकारणाने वैज्ञानिक भूमिकेतूनही या दिक् पालांचे महत्त्व आहेच. पण मूर्तीविज्ञानात त्याची दखल तू कशी घेतोस याची उत्सुकता आहे :)
शिव म्हणा, रुद्र म्हणा कि आणखी काहि. आर्य, अनार्य, द्रविड, वैदीक वगैरे संस्कृतींचे पडसाद त्या त्या काळच्या मुर्तीशास्त्रात आढळतात. पण हि मंदीरे आणि मुर्त्या केवळ काहि कथाबीजांवर आधारीत असतात का? कि त्या प्रदेशाचा राजा, मुर्तीकाराला अभिप्रेत भाव, अॅक्च्युअल स्थापत्य करणार्यांच्या सोयी-एक्स्पर्टीज-मर्यादा, उपलब्ध साधनं, जसं पाषाण वगैरे घटक कंसीडर केल्या जात असतील? सर्वात महत्वाचं म्हणजे प्राचीक काळापासुन अनेक प्रकारच्या उपासना पद्धतींच्या अनाकलनीय प्रॅक्टीस प्राचारात होत्या व आहेत. जर हि मंदीरं त्या विशिष्ट उपासनेकरता बनविली जात असतील, किंवा उपलब्ध मंदीरात एखादी उपासना सुरु करण्यात येत असेल तर त्या मुर्ती किंवा मंदीराच्या रचना व आवार त्या उपासनेला अनुकुल बनवण्यात येत असावं काय? अशी कुठली सिग्नेचर व्यवस्था दिसुन येते का? केवळ मातृभाव, प्रजजन गौरव किंवा शौर्य कौतुक करायला म्हणुन हि मंदीरं बांधण्यात आलि असं वाटत नाहि. व्हॉट माइट बी द अदर साईड?
ह्या मूर्ती शक्यतो ग्रांथिक वर्णनांवर आधारीत असतात. काही मूर्ती चक्क वेदांतील उल्लेखाबरहूकूम बनवलेल्या आहेत. उदा. पाटेश्वरातील अग्नी वृषाची अतिशय दुर्मिळ मूर्ती. पुराणांत, रामायण, महाभारत आदी महाकाव्यांत बरीच वर्णने आली आहेत. त्यानुसारही मूर्टी घडवल्या जातात. अर्थात प्रत्यक्ष पूजेच्या मूर्ती शक्यतो साध्या असून मंदिरांच्या अथवा लेण्यांच्या बाह्यभितींवर पुराणातले प्रसंग कोरलेले आढळतात.
मूर्ती कोरण्याच्या बाबतीत परंपरांचे दोन प्रकारे पालन केलेले आढळते जसे पहिला प्रकार म्हणजे विष्णू, ब्रह्मा, शिव, स्कंद किंवा इतरही बर्याच देवता. यांची लक्षणे सर्व ठिकाणी सारखीच आढळतात. उदा. शिवाच्या हाती त्रिशूळ - डमरू, विष्णूच्या हाती शंख-चक्र. ही परिस्थिती सहसा कुठेच बदलत नाहीच.
तर दुसरा प्रकार म्हणजे लेणी-मंदिरे कोरण्याच्या कलेतील बदल. माझ्या मते भारतात बौद्द लेण्यांपासून प्रेरणा घेण्यात आली. काळानुसार शैलीत बदल दिसत असला तरी मूळ गाभा एकच असल्याचे दिसते.
वेगवेगळ्या राजवटींमध्ये मूर्ती कोरण्यात फरक असला तरी मूळ मूर्तीची लक्षणे तीच असल्याचे दिसते. राष्ट्रकूट कला ही सहसा द्राविड पद्धतीची दिसते साहजिकच त्यांनी ऐहोळे, पट्टदकल, महाबलीपुरम इत्यादी प्राचीन मंदिरांच्या शैलीवरून प्रेरणा घेतल्याचे दिसते. तर होयसाळांनी मूळ गाभा तोच ठेवून मूर्ती अतिशय सालंकृत करून नवीनच होयसाळ शैली निर्माण केली जी आज होयसाळ स्कूल म्हणून ओळखली जाते. अर्थात ह्यात तिकडच्या ग्रेनाईट दगडाचा पण तितकाच महत्वाचा वाटा.
सहासा ही मंदिरे सर्वसाधारण उपासनेसाठी बनवली जात असावेत. प्रसंग कोरण्याचा सर्वात मोठा हेतू मला असा वाटतो म्हणजे त्याकाळी बौद्ध धर्माच्या वाढत्या प्रसारामुळे मूळ वैदिक धर्मापासून दूर जाणार्या जनतेला परत आपल्या धर्माकडे वळवून घेणे. अर्थात त्याचा बौद्ध धर्मावर प्रतिकूल परिणाम झालाच. वेरूळसारख्या तिभव्य लेण्याच्या निर्मितीनंतर अजिंठा जवळजवळ विस्मृतीत गेले.
माझ्या मते तरी धर्मप्रसारासाठीच आणि त्यानंतर वेगवेगळ्या राजवटींशी असलेल्या स्पर्धेतून देखणी मंदिरे उभारली गेली. उपासना हा हेतू बहुधा गौणच होता.
अर्थात हिंदूंमध्ये तेव्हाही तंत्र उपासना चालत होतीच पण सहसा यासाठी जनतेपासून फटकून असणार्या, एकाकी, निर्जन जागांचा उपयोग केला गेला. उदा: पाटेश्वर.
वेगवेगळ्या प्रदेशांतील मूर्तींचे चेहरे पहाताना त्या त्या प्रदेशातील लोकांच्या चेहरेपट्टीशी ते मिळतेजुळते वाटतात. उदा.राणीवाव या लेखांतल्या स्त्रीमूर्ती या पातळ ओठांच्या आणि सडपातळ बाहू-दंड-मांड्यादि अवयवांच्या वाटतात. जैनांच्या महावीरमूर्तीचे ओठ हे अगदी वेगळे असतात. म्हणजे वरच्या ओठाच्या दोन पाकळ्या अर्धगोलाकार वरती वळलेल्या वगैरे. वेगवेगळ्या देशांतील बुद्धप्रतिमा पहातानाही असेच वाटते. दक्षिण भारतातील स्त्रीमूर्ती अतिसौष्ठवपूर्ण आणि धष्टपुष्ट वाटतात. हा माझा दृष्टिभ्रम आहे की खरेच असे काही असू शकते?
चित्रकलेतही वेगळ्या वंशाच्या लोकांनी काढलेली भारतीयांची चित्रे वेगळी म्हणून ओळखू येतात. अपरे आणि पातळ नाक, गोलसर (आपल्याकडले मीन, हरिण वगैरेसारखे लांबट असतात) डोळे ,लांब मान, उतरता आणि विस्तृत स्कंधप्रदेश असा थोडा वेगळेपणा दिसतो. असो. मूर्तिशास्त्राचा काहीच अभ्यास नाही तेव्हा इथेच थांबावे हे बरे.
अर्थात त्याकाळी लिंग पूजा ही शिव अथवा रूद्र देवतेची नसून ती होती प्रजनन शक्तीची. निसर्गाच्या पुनरुत्पादनाच्या चमत्काराचे प्रतिक म्हणून स्त्रीशक्तीची उपासना योनीपूजेच्या स्वरूपात तर पुरुष शक्तीची उपासना लिंग स्वरूपात करण्यास प्रारंभ झाला असे म्हणता यावे.
कमाल असते नाही अशा योगायोगांची ? विचक्राफ्ट संबंधि सर्व मुळ माहितिस्त्रोतात ते फक्त निसर्गधर्म/शक्ति/देवता मानतात व त्यात पुरुषाला होर्न(शिंग असलेला) गॉड ऑफ हंटिग अन स्त्रिला गॉडेस ऑफ फर्टिलिटी मानुन पुजा/विधी करतात.
आंध्रप्रदेशात गुडिमल्लम इथे इसापूर्व ३ शतकातील एक शिव मंदिर आहे. तिथे असलेली ही अनोखी मुर्ती. (फोटो विकिवरून साभार)
![]()
सर्व मूर्ती सहाव्या शतकांनतरच्या आहेत . आठव्या शतकांनतरच्या मूर्ती फार आखीव रेखीव होऊ लागल्या (=सुबक ?)आणि भाव लोप पावले .
गंडकी नदीतल्या काळ्या शाळीग्रामाचा वापर थोडा नंतर सुरू झाल्यावर काही ठिकाणची लिंगे नंतर बदलण्यात आली असावीत .
परकी आक्रमणांत लिंगे फोडली गेल्यावर तेथे नवीन न बसवता "गुप्तलिंग " म्हणू लागले असावेत .(भिमाशंकर ?)
परकी आक्रमणांत लिंगे फोडली गेल्यावर तेथे नवीन न बसवता "गुप्तलिंग " म्हणू लागले असावेत .(भिमाशंकर ?)
सहमत. आज जिथे लिंग दिसत नाही ती बहुतांश मूर्तीभञ्जकांनी भग्न केलेली आहेत. काही मोरीच्या वाटेवर तर काही विहिरीतून पाणी शेंदताना उभे राहण्याच्या जागी बसवली गेलेली.
असेच एक सासवडच्या चांगावटेश्वर मंदिरातील भग्न शिवलिंग. धडधडीतपणे फोडून काढल्याचे दिसत असूनही हे शिवलिंग गुप्त आहे असे तिथल्याच एका फलकावर लिहिलेले आहे.
आताचे शिवाचे स्वरूप हे आर्यांचा रुद्र आणि द्रविडांचा लिंगरूप शिव यांचे एकत्रिकरण असावे असेच दिसते. त्यामुळेच शिवाची उपासना सर्वात व्यापक प्रदेशात होते. नेपाळातील पशुपतीनाथापासून ते थेट रामेश्वरपर्यंत.
सिंधु संस्कृतीच्या उत्खननात सापडलेल्या महत्त्वाच्या गोष्टींमधे पशुपतीस्वरूप त्रिमुखी देवतेचे शिल्प आणि लिंगसदृश शिल्प आहे.
http://www.hindunet.org/hindu_history/sarasvati/html/Trefoil1.htm
http://en.wikipedia.org/wiki/Indus_Valley_Civilization
https://sites.google.com/site/kalyan972/culturallegacy
http://lafinefleurduyoga.over-blog.com/article-16057840.html
इथे त्यांची छायाचित्रे पाहता येतील. अर्थात हा आताच्या स्वरूपातील शिव नाही तर अगदी प्राथमिक काळातील शिवसदृश देवता (पशुपती) आणि आदिम रहिवाशांची लिंगपूजा असावी.
शिवमूर्तींबाबत पं महादेवशास्त्री जोशी यांच्या 'भारताची मूर्तीकला' या पुस्तकात रुद्र हा अग्नितत्त्वापासून उत्पन्न झाला असे वेदातील उल्लेख आणि सिंधुसंस्कृतीतील पशुपती आणि लिंग या शिल्पांबद्दल उल्लेख देऊन पुढे या दोन्हीचे एकत्रित रूप म्हणजे आजचे शिवाचे स्वरूप यबद्दल विस्ताराने लिहिले आहे. या पुस्तकात शिवाच्या मूर्तीबद्दल पं. जोशी म्हणतात, " शाळुंका ही पार्वतीस्वरूप तर शिवलिंग हा महेश्वर. शाळुंकेसहित लिंगाची पूजा केल्याने दोन्हीची पूजा केल्यासारखे होते. शाळुंका कशी निर्माण करावी? शाळुंकेच्या घेराचे ३ प्रकारे आहेत. लिंगाच्या घेराच्या तिप्पट तो अधम, दीडपट तो मध्यम तर चौपट तो उत्तम. शाळुंकेची उंची विष्णुभागाइतकी असावी, तिचा आकार चतुष्कोण, द्वादशकोण, षोडषकोण किंवा गोल असावा. अभिषेक हा शिवलिंगाचा मुख्य उपचार असल्याने शाळुंकेला पन्हळ ठेवणे आवश्यक आहे. शिवलिंग शाळुंकेत स्थापन करताना त्याचे ब्रह्मभाग व विष्णुभाग हे भूमीत जायला हवेत. रुद्रभाग तेवढाच वर असावा."
मूर्तींच्या प्रकारात पं जोशी दक्षिणामूर्ती असा एक प्रकार देतात. तो बुद्धी देणारा आणि सामान्य मानवरूपात दाखवला जातो. आणखी एक प्रकार म्हणजे अर्धनारीश्वर. मूळ लिंग आणि शाळुंका या स्वरूपातील शिवाची मूर्ती बनवायला सुरुवात झाली तेव्हाचे रूप म्हणजे एकाच मूर्तीत सामावलेले शिव आणि पार्वेती.
"नंदी, गणेश, स्कंद, भैरव, पार्वती (दुर्गा) हे शिवाच्या परिवारातील देव आणि त्यांच्या मूर्ती शिवाच्या मूर्तीबरोबर किंवा वेगळ्या बघायला मिळतात."
गोवा आणि कोकणात शिवगणांमधे वेताळ आणि अन्य स्थानिक राखणदार समजले गेलेल्या देवांचा समावेश होतो.
हा लोलये येथील बेताळ.
ही हरवळे (साखळी) येथील गुहांतील वैशिष्ट्यपूर्ण आकाराची शिवलिंगे. यांच्याबद्दल जास्त माहिती मिळू शकली नाही पण कदाचित ती तांत्रिक पूजेशी संबंधित असू शकतील असे वाटते.
सविस्तर प्रतिसाद आणि त्यातील दुवे आणि छायाचित्रांबद्दल धन्स.
गुहेतील शिवलिंगे अगदी आदिम काळातील म्हणजे दिसतात. ह्यांचा काळ नक्की कोणता ते माहित करून घ्यायला आवडेल. पण तांत्रिक पंथातील वाटत नाही. ही शिवलिंगांच्या प्राथमिक अवस्थेतील दिसतात. पुरुष शिश्नाचा आकार असलेली. बहुधा २००० वर्षे जुनी.
पं. महादेवशास्त्री जोशी यांचे भारताची मूर्तीकला हे पुस्तक नक्कीच विकत घेईन.
एकाच्या म्हणण्याप्रमाणे बहुतेक चौथ्या शतकातल्या मानवनिर्मित गुहा असाव्यात. हे फार जुने ठिकाण आहे. इथे एक जुनी जैन बस्ती आहे तसंच एक बुद्धप्रतिमाही सापडली होती.
साधारण अशा आकाराची लिंगे घारापुरी बेटावर आणि ख्मेर अंगकोरवट इथे मिळाल्याचे उल्लेख सापडले. तर खरोखरच तिथे तशा अकाराची चित्रं पहायला मिळाली.
http://blogs.bootsnall.com/theglobaltrip/updates/005873.shtml
http://en.wikipedia.org/wiki/Khmer_architecture
शिवप्रभाव मुर्ती, लिंग, नाणी आणि लोककथा यांच्या रुपांत पामिरचे पठार (आत्ताचे ताजिकिस्तान, किर्घिजिस्तान, अफगाणिस्तान आणि हिंदुकुश पर्वतराजी आणि तिच्या आजूबाजूचा प्रदेश), भारत, ब्रम्हदेश ते इंडोनेशियासह दक्षिणपूर्व आशियात अगदी व्हिएतनामपर्यंत सापडतो.
शिवप्रभाव मुर्ती, लिंग, नाणी आणि लोककथा यांच्या रुपांत पामिरचे पठार (आत्ताचे ताजिकिस्तान, किर्घिजिस्तान, अफगाणिस्तान आणि हिंदुकुश पर्वतराजी आणि तिच्या आजूबाजूचा प्रदेश), भारत, ब्रम्हदेश ते इंडोनेशियासह दक्षिणपूर्व आशियात अगदी व्हिएतनामपर्यंत सापडतो.
परकी आक्रमणांत लिंगे फोडली गेल्यावर तेथे नवीन न बसवता "गुप्तलिंग " म्हणू लागले असावेत .(भिमाशंकर ?)
सहमत. आज जिथे लिंग दिसत नाही ती बहुतांश मूर्तीभञ्जकांनी भग्न केलेली आहेत. काही मोरीच्या वाटेवर तर काही विहिरीतून पाणी शेंदताना उभे राहण्याच्या जागी बसवली गेलेली.
असेच एक सासवडच्या चांगावटेश्वर मंदिरातील भग्न शिवलिंग. धडधडीतपणे फोडून काढल्याचे दिसत असूनही हे शिवलिंग गुप्त आहे असे तिथल्याच एका फलकावर लिहिलेले आहे.
एक "भैरव" अनेक वर्षापूर्वी नेपाळमध्ये पाहिला होता. या भैरवाला अल्कोहोलचा नैवेद्य आवडतो. माझ्याकडील स्थिरचित्रात याचे चित्र आहे ते जोडत आहे "नैवेद्य" मूर्तिवर दिसत असलेल्या छिद्रात टाकायचा असतो असे आठवते.

पण योग्य चित्र निवडल्याची खात्री नसल्याने पट्कन सापडलेला एक दुवा देखील जोडत आहे.
http://brookstonbeerbulletin.com/beer-in-art-45-the-hindu-god-shiva-as-b...
क प्रष्ण आहे की शिवलिंगाचे श्रुंग हे उत्तर दिशा दर्शवते किंवा उत्तरेकडे असते हे खरे आहे का?
होय, शाळुंकेची वहाण उत्तरेकडे असावी अश्या तर्हेने शिवलिंग स्थापलेले असते.
दिशेबद्दल माहिती नाही.
पण शिवलिंगाची पन्हळ (शाळुंकेचा लांबट भाग) हा साधकाच्या उजवीकडे असावा असा संकेत आहे.
पाटेश्वरची शाक्तपंथीय शिवलिंगे ह्या संकेताला छेद देतात.
--
पण कदाचित श्रुन्ग हे उत्तर दिशेला ठेव्ण्याच्या पद्धती साठी सुद्धा असु शकेल? हे दिशादर्शकाचा वापर करुन ठरवता येवु शकेल.
बहुतेक वेळा शिवमंदीरात जाताना शिवपिंडीचे दर्शन घ्यायला पायर्या उतरून खाली जावे का लागत असावे? कोकणातील बिमलेश्वर सारख्या मंदिराचे एखाद दुसरा अपवाद वगळता हेच सगळीकडे दिसून येते..
प्रॅक्टिकल शक्यता अशी की शिवलिंगावर अभिषेक सतत सुरू असतो. त्यातील इकडे तिकडे उडालेले पाणी गाभार्यातच रहावे आणि त्या पाण्याने सगळे देऊळ ओले/निसरडे होऊ नये यासाठी कदाचित अशी रचना करत असावेत.
तसेच एक अजुन पाहिले आहे की शिव मंदीराला लागुनच पाण्याचा स्त्रोत किंवा तलाव असतो...पूर्वीच्या काळी ओलेत्यानेच महादेवाची पुजा / दर्शन करावे असा प्रघात असावा असे मला वाटते. { हा माझा फक्त अंदाज आहे.}
शिवमंदिरांमधील शिवपिंडी ह्या सभामंडपाच्या पातळीतच आहेत.
कोल्हापुरच्या अंबाबाईच्या मंदिरातील शिवमंदीर हे तर एक माळा वर आहे.
उज्जैन जवळही एक भेरवनाथाचे मंदीर आहे.त्यालाही दारुचाच "भोग" चढवतात.आमचे कुलदैवत असलेल्या कर्हाडजवळील भैरोबाला पुर्वी गांजाची चिलीम भरुन नेवैद्य दाखवायचे असे आमचे सासरकडच्या वडीलधार्यांनी सांगीतलेले पुसटसे स्मरते आहे.
कुडाळ मधिल मुर्तींना अजुनही गांजाचा नैवद्य लागतो माहितेय पण कराडमधील कोणतं मंदिर कळेल का ???
बदामिच्या गुंफेंत आणि परिसरां त छान लिंगे आणि साडेसहाफुटी पूर्ण शिवमूर्ती अखंड आहेत .
ऐहोळे गावातील मंदिरातल्या पिंडीवर पाणी टाकले की त्यात नंदीचे प्रतिबिंब दिसते (मोटरच्या आरशात दिसते तसे)
शिव म्हणा, रुद्र म्हणा कि आणखी काहि. आर्य, अनार्य, द्रविड, वैदीक वगैरे संस्कृतींचे पडसाद त्या त्या काळच्या मुर्तीशास्त्रात आढळतात. पण हि मंदीरे आणि मुर्त्या केवळ काहि कथाबीजांवर आधारीत असतात का? कि त्या प्रदेशाचा राजा, मुर्तीकाराला अभिप्रेत भाव, अॅक्च्युअल स्थापत्य करणार्यांच्या सोयी-एक्स्पर्टीज-मर्यादा, उपलब्ध साधनं, जसं पाषाण वगैरे घटक कंसीडर केल्या जात असतील? सर्वात महत्वाचं म्हणजे प्राचीक काळापासुन अनेक प्रकारच्या उपासना पद्धतींच्या अनाकलनीय प्रॅक्टीस प्राचारात होत्या व आहेत. जर हि मंदीरं त्या विशिष्ट उपासनेकरता बनविली जात असतील, किंवा उपलब्ध मंदीरात एखादी उपासना सुरु करण्यात येत असेल तर त्या मुर्ती किंवा मंदीराच्या रचना व आवार त्या उपासनेला अनुकुल बनवण्यात येत असावं काय? अशी कुठली सिग्नेचर व्यवस्था दिसुन येते का? केवळ मातृभाव, प्रजजन गौरव किंवा शौर्य कौतुक करायला म्हणुन हि मंदीरं बांधण्यात आलि असं वाटत नाहि. व्हॉट माइट बी द अदर साईड?
ह्या मूर्ती शक्यतो ग्रांथिक वर्णनांवर आधारीत असतात. काही मूर्ती चक्क वेदांतील उल्लेखाबरहूकूम बनवलेल्या आहेत. उदा. पाटेश्वरातील अग्नी वृषाची अतिशय दुर्मिळ मूर्ती. पुराणांत, रामायण, महाभारत आदी महाकाव्यांत बरीच वर्णने आली आहेत. त्यानुसारही मूर्टी घडवल्या जातात. अर्थात प्रत्यक्ष पूजेच्या मूर्ती शक्यतो साध्या असून मंदिरांच्या अथवा लेण्यांच्या बाह्यभितींवर पुराणातले प्रसंग कोरलेले आढळतात.
मूर्ती कोरण्याच्या बाबतीत परंपरांचे दोन प्रकारे पालन केलेले आढळते जसे पहिला प्रकार म्हणजे विष्णू, ब्रह्मा, शिव, स्कंद किंवा इतरही बर्याच देवता. यांची लक्षणे सर्व ठिकाणी सारखीच आढळतात. उदा. शिवाच्या हाती त्रिशूळ - डमरू, विष्णूच्या हाती शंख-चक्र. ही परिस्थिती सहसा कुठेच बदलत नाहीच.
तर दुसरा प्रकार म्हणजे लेणी-मंदिरे कोरण्याच्या कलेतील बदल. माझ्या मते भारतात बौद्द लेण्यांपासून प्रेरणा घेण्यात आली. काळानुसार शैलीत बदल दिसत असला तरी मूळ गाभा एकच असल्याचे दिसते.
वेगवेगळ्या राजवटींमध्ये मूर्ती कोरण्यात फरक असला तरी मूळ मूर्तीची लक्षणे तीच असल्याचे दिसते. राष्ट्रकूट कला ही सहसा द्राविड पद्धतीची दिसते साहजिकच त्यांनी ऐहोळे, पट्टदकल, महाबलीपुरम इत्यादी प्राचीन मंदिरांच्या शैलीवरून प्रेरणा घेतल्याचे दिसते. तर होयसाळांनी मूळ गाभा तोच ठेवून मूर्ती अतिशय सालंकृत करून नवीनच होयसाळ शैली निर्माण केली जी आज होयसाळ स्कूल म्हणून ओळखली जाते. अर्थात ह्यात तिकडच्या ग्रेनाईट दगडाचा पण तितकाच महत्वाचा वाटा.
सहासा ही मंदिरे सर्वसाधारण उपासनेसाठी बनवली जात असावेत. प्रसंग कोरण्याचा सर्वात मोठा हेतू मला असा वाटतो म्हणजे त्याकाळी बौद्ध धर्माच्या वाढत्या प्रसारामुळे मूळ वैदिक धर्मापासून दूर जाणार्या जनतेला परत आपल्या धर्माकडे वळवून घेणे. अर्थात त्याचा बौद्ध धर्मावर प्रतिकूल परिणाम झालाच. वेरूळसारख्या तिभव्य लेण्याच्या निर्मितीनंतर अजिंठा जवळजवळ विस्मृतीत गेले.
माझ्या मते तरी धर्मप्रसारासाठीच आणि त्यानंतर वेगवेगळ्या राजवटींशी असलेल्या स्पर्धेतून देखणी मंदिरे उभारली गेली. उपासना हा हेतू बहुधा गौणच होता.
अर्थात हिंदूंमध्ये तेव्हाही तंत्र उपासना चालत होतीच पण सहसा यासाठी जनतेपासून फटकून असणार्या, एकाकी, निर्जन जागांचा उपयोग केला गेला. उदा: पाटेश्वर.
थोडे धार्ष्ट्य : वेगवेगळ्या प्रदेशांतील मूर्तींचे चेहरे पहाताना त्या त्या प्रदेशातील लोकांच्या चेहरेपट्टीशी ते मिळतेजुळते वाटतात. उदा.राणीवाव या लेखांतल्या स्त्रीमूर्ती या पातळ ओठांच्या आणि सडपातळ बाहू-दंड-मांड्यादि अवयवांच्या वाटतात. जैनांच्या महावीरमूर्तीचे ओठ हे अगदी वेगळे असतात. म्हणजे वरच्या ओठाच्या दोन पाकळ्या अर्धगोलाकार वरती वळलेल्या वगैरे. वेगवेगळ्या देशांतील बुद्धप्रतिमा पहातानाही असेच वाटते. दक्षिण भारतातील स्त्रीमूर्ती अतिसौष्ठवपूर्ण आणि धष्टपुष्ट वाटतात. हा माझा दृष्टिभ्रम आहे की खरेच असे काही असू शकते?
चित्रकलेतही वेगळ्या वंशाच्या लोकांनी काढलेली भारतीयांची चित्रे वेगळी म्हणून ओळखू येतात. अपरे आणि पातळ नाक, गोलसर (आपल्याकडले मीन, हरिण वगैरेसारखे लांबट असतात) डोळे ,लांब मान, उतरता आणि विस्तृत स्कंधप्रदेश असा थोडा वेगळेपणा दिसतो. असो. मूर्तिशास्त्राचा काहीच अभ्यास नाही तेव्हा इथेच थांबावे हे बरे.
नायिका भेद
मध्ययुगीन यादवकालीन मंदिरांमध्ये आपणास सुरसुंदरी आणि नायिकापट्ट आढळतात. सुरसुंदरी म्हणजे नृत्यमुद्रेतील अथवा वाद्यमुद्रेतील स्त्री प्रतिमा. ह्या एकतर विविध वाद्ये तरी वाजवत असतात किंवा नर्तन तरी करत असतात. तर नायिका म्हणजे वाद्यविरहित स्त्री प्रतिमा. ह्या बहुतांशी नृत्यमुद्रेत दिसत नाहीत. नायिका ह्या विविध शृंगारमुद्रेत किंवा काही विशिष्ट क्रिया करताना आपणास आढळतात. उदा. वेणी घालणे, भांग पाडणे, पुत्र सांभाळणे इ. तत्कालीन जनजीवनातील एकूण चालीरितीच ह्या शिल्पांद्वारे प्रकट होतात असे मला वाटते.
खजुराहोची मंदिरे ह्या नायिकापट्टांबाबत परिपूर्ण आहेत असे मी मानतो. येथे जवळपास सर्वच प्रकारच्या नायिकांची शिल्पे शिल्पकारांनी मोठ्या विलक्षण नजाकतीने कोरलेली आहेत. अर्थात खजुराहो मी अजून पाहिलेले नाही. पण पुणे, नाशिक, कोल्हापूर परिसरातील काही प्राचीन मंदिरे धुंडाळतांना विविध प्रकारच्या नायिकामूर्ती पाहण्यात आल्या त्यापैकीच काही येथे मांडत आहे. यांतील बहुतेक सर्वच मूर्ती त्रिभंग प्रकारातल्या आहेत.
१. पुत्रवल्लभा.
ह्या नायिका म्हणजे वात्सल्याच्या मूर्तीच. ह्यांचा हातात अथवा कडेवर ह्यांचा पुत्र दाखवलेला असतो व ह्या ममतेने त्याचे लाड करत असतात.
ही सिन्नरच्या गोंदेश्वर मंदिरातील पुत्रवल्लभा. हिने आपल्या तळहातावर पुत्राला तोलून धरले आहे.
सिन्नरच्याच गोंदेश्वर मंदिरातील ही अजून एक पुत्रवल्लभा. हीने आपल्या पुत्राला एका हातावर घेतले असून दुसरा हात आधारासाठी चौकटीवर ठेविला आहे.
ही रांजणगावजवळील पिंपरी दुमाला नावाच्या लहानशा गावातील सोमेश्वर मंदिराच्या भिंतीवर असलेली पुत्रवल्लभा. हीने दोन्ही हातांनी पुत्राला तोलून धरले असून त्याचे मस्तकाचे ती अवघ्राण करीत आहे.

२. पत्रलेखिका.
ह्या नायिका पत्र लेखन करताना दिसतात. ह्यांच्या अत्यंत सुडौल मूर्ती खिद्रापूरच्या कोपेश्वर मंदिरात आहेत.
खिद्रापूर कोपेश्वर मंदिरातील हे सौष्ठवपूर्ण पत्रलेखिका. नीट निरखून पाहिल्यास हीने अंगंठा आणि तर्जनी यांमध्ये लेखणी हाती धरिली आहे तीही स्पष्टपणे दिसून यावी. हिने चेहरा मात्र पत्राकडेच वळवला असल्याने आपल्याला हिचा चेहरा मात्र दिसत नाही.
खिद्रापूर कोपेश्वर मंदिरातीलच अजून ही एक पत्रलेखिका. ही मात्र आपल्याला हीचा चेहरा दाखवतेय.
कोपेश्वर मंदिरापासून अगदी जवळच असलेल्या खिद्रापूरच्या जैन मंदिरातील ही एक अजून पत्रलेखिका.
३. आलस्यसुंदरी.
ही नुकतीच झोपेतून उठलेली असल्याने दोन्ही हात डोक्यावर नेऊन आळोखेपिळोखे देऊन आलेला आळस दूर करायचा प्रयत्न करत असते.
पेडगावच्या लक्ष्मीनारायण मंदिरातील ही आलस्यसुंदरी पहा.
४. कर्पूरसुंदरी
ह्या नायिका आपला प्रचंड केशसंभार खांद्यावरून शरीराच्या पुढच्या भागावर घेऊन त्याची वेणी घालायचा प्रयत्न करीत असतात.
खिद्रापूरच्या कोपेश्वर मंदिरातील ही कर्पूरसुंदरी
खिद्रापूरच्याच जैन मंदिरातील ही अजून एक कर्पूरसुंदरी.
५. दर्पणसुंदरी अथवा दर्पणा.
मध्ययुगीन मंदिरात या नायिकांचे प्रकार बहुधा सर्वात जास्त दिसत असावेत. ह्यांच्या हातात बहिर्वक्र आरसा असतो. तत्कालिन कालखंडात काचेचे आरसे नसल्याने शिसे गुळगुळीत दगड घासून घासून गुळगुळीत केले जात आणि जास्तीत जास्त दृश्य दिसावे म्हणून हे आरसे बहिर्वक्र केले जात. ह्या नायिका आरशात बघून त्या भांग पाडणे, शृंगार करणे, कुंकूम रेखाटणे इत्यादी क्रिया करीत असतात.
पिंपरी दुमाला येथील सोमेश्वर मंदिरातील ही दर्पण सुंदरी
आरशात बघून आपल्या डोईवरचे केस ही नीट निरखून सजविते आहे.

सिन्नरच्या गोंदेश्वर मंदिरातील ही एक दर्पणा.
गोंदेश्वरातीलच अजून ही एक दर्पणा.
खिद्रापूरच्या जैन मंदिरातील ही अजून एक दर्पणसुंदरी.
भुलेश्वरातील ही एक दर्पणा
हे शिल्प माझ्या सर्वाधिक आवडीचे. किती निगुतीने ही आपले सौंदर्यप्रसाधन करीत आहे. हे ही शिल्प भुलेश्वर मंदिरातलेच.
६.
ह्या प्रकाराला नक्की काय म्हणतात ते मला माहित नाही. पण ही शिल्पे फार मजेशीर आहेत. आपला साजशृंगार आटोपून आपल्या प्रियकराची वाट बघणार्या अथवा त्याच्या भेटीसाठी निघालेल्या ह्या सुंदरी. ह्या नखशिखांत आवरून तयार असतानाच एखादे चावट मर्कट ह्यांचे वस्त्र अलगद वर उचलून अथवा ओढून ह्यांना त्रास देण्याचा प्रयत्न करते आणि ह्या नायिका पणे सलज्जतेने त्यांना चापट मारतांना आढळतात. मनुष्याचा चावटपणाच ह्या मर्कटांच्या रूपाने येथे चित्रित केलाय की काय न कळे.
पिंपरी दुमाला येथील ही नायिका. एक मर्कट तिला त्रास देत असून ती एका हाताने माकडाला दूर करण्याचा प्रयत्न करीत असून दुसरा हात चापट देण्याच्या आविर्भावात तिने वर उचलला आहे.

ही खिद्रापूर कोपेश्वर मंदिरातील अत्यंत देखणी सुंदरी मर्कटला कसे हाकलीत आहे पहा.
ही खिद्रापूरच्या जैन मंदिरातील दोन नायिका. दोहींचेही वस्त्र मर्कटाने उचलले असून सुंदरी चपेटदान आविर्भावात आहेत.
--
ही सिन्नरच्या गोंदेश्वर मंदिरातील सुंदरी. हिला दोन्ही बाजूंनी दोन मर्कटे छळत आहेत.
७.
हा अजून एक वेगळा प्रकार.
हा स्त्रीचे सामर्थ्य दाखवणारा. हीने आपल्या एका हातात मुंगूस तर दुसर्या हातात साप धरीला असून त्या दोघांनाही ही झुंजवत आहे. जणू माझी तुमच्यावर पूर्ण हुकूमत आहे असेच ती दर्शवीत आहे.
खिद्रापूरच्या जैन मंदिरातील ही तशा प्रकारची प्रतिमा.
८.
हा सुद्धा एक वेगळाच प्रकार.
ह्या नायिकेच्या पायात रूतलेला काटा हीची बुटकी सखी दूर करीत आहे किंवा हीचे पैंजण ती नीट बांधत आहे.
पेडगावच्या मंदिरातील हे शिल्प
सिन्नरच्या गोंदेश्वर मंदिरातील अशाच प्रकारची ही एक नायिका.
९. शुकसारिका.
हा शिल्पाचा प्रकार अतिशय दुर्मिळ. हा मला फक्त पेडगावच्या मंदिरात बघायला मिळाला. भुलेश्वर मंदिरात शुकसारिका नक्कीच असावी मात्र तिकडील शिल्पे मूर्तीभंजकांच्या तडाख्यात सापडून प्रचंड प्रमाणात भग्न झालेली असल्याने ओळखू येत नाहीत.
ह्या प्रकारच्या शिल्पात नायिकेने एका हातात आंबे असलेली डहाळी पकडली असते तर दुसर्या हातात पोपट असतो.
पेडगावच्या मंदिरातील ही शुकसारिका बघा.
हीने आपल्या डाव्या हातात आंब्याची डहाळी पकडलेली असून उजव्या हातात पोपट आहे. तो पोपट तिच्या भरीव उरोजालाच आंबे समजून त्यांना आपल्या चोचीने स्पर्श करू पाहात आहे. अर्थात मूर्तीभंजकांच्या हल्ल्यांमुळे हीचा उजवा हात त्यावरील शुकासह भग्न झालेला असून आपल्याला केवळ तिच्या हातातील आंब्याच्या डहाळीमुळे व उजव्या हाताच्या स्थितीवरून ही शुकसारिका असल्याची कल्पना येते.
खिद्रापूरच्या कोपेश्वर मंदिरातील ही शुकसारिका
१०. विषकन्या.
तत्कालीन कालखंडात शत्रूला संपवण्यासाठी विषकन्यांचा सर्रास वापर होईल. शत्रूला आपल्या सौंदर्याने भुलवून विषप्रयोगाद्वारे ह्या त्याचा मृत्यू घडवून आणत.
शिल्पांमधले ह्यांचे चित्रण सहजी ओळखता येते. अतिशय सुंदर, सुडौल, पूर्णतया नग्न, मस्तकी अथवा गुढघ्यावर सर्पांचा वेढा ही यांची प्रमुख लक्षणे. काही वेळा ह्यांच्या पायांत पादत्राणे सुद्धा आढळून येतात.
पिंपरी दुमाला मधील ही विषकन्या. हिने आपल्या मस्तकी काहीतरी धरीले असून पायांत सर्पांचा वेढा आहे.

भुलेश्वर मंदिराच्या बाह्यभिंतीवरील ही विषकन्या पाहा. हीने आपल्या मस्तकी सर्प धारण केला आहे.
सिन्नरच्या गोंदेश्वर मंदिरातील ही विषकन्या. हीने आपल्या खांद्यावरून सर्प धारण केला असून ही आपले विभ्रम दाखवीत आहे. हिच्या पायांकडे पहा. चक्क चपला/ सॅन्डल्स दिसत आहेत.
खिद्रापूरच्या कोपेश्वर मंदिरातल्या बाह्य भिंतीवरची ही अत्यंत सौष्ठवपूर्ण विषकन्यका. हीने आपल्या कमरेवरून सर्प गुंडाळलेला असून ती आपले नानाविध विभ्रम दाखवीत आहे. हिने सुद्धा पादत्राणे परिधान केलेली आहेत.
अत्यंत सुंदर मूर्ती व त्यांचे फोटो. 'त्रिभंग' म्हणजे नेमके काय? 'तीन ठिकाणातून वळवलेले शरीर' (उदा. कंबर, खांदे व मान) असा त्याचा अर्थ आहे का? तसेच 'नायिका' ची व्याख्या काय आहे?
'नायिकाभेद' शीर्षक वाचून भरतमुनींच्या 'अष्टनायिका' अर्थात 'वासकसज्जा' 'विरहोत्कंठिता' 'स्वाधीनभर्तृका' 'कलहांतरिता' 'खंडिता' 'विप्रलब्धा' 'प्रोषितभर्तृका' आणि 'अभिसारिका' नायिकांबद्दल हा लेख असेल, असे वाटले होते.
अन्य ग्रंथात बारा, सोळा, नायिका असल्याचेही वाचनात आले त्यापैकी एक 'प्रवत्स्यत्वल्लभा' आहे. अन्य नावे अजून सापडली नाहीत.
तुम्ही इथे दिलेली नावे कोणत्या ग्रंथात नोंदलेली आहेत? ही पण अगदी वेगळी, आणि खास शिल्पांसाठी योजलेली वाटतात.
भरतमुनिंच्या 'अष्टनायिकां'च्या मूर्ती आहेत का? (चित्रे बरीच आढळतात). पूर्वी चित्रकार दीनानाथ दलाल यांनी या अष्टनायिकांची सुंदर चित्रे काढली होती.
या विषयावर अत्यंत सुंदर धागा काढलात, हे थोरच.
धन्यवाद.
त्रिभंग म्हणजे तीन कोनांतून वळवलेले शरीर. शरीराला उठाव देण्यासाठी त्रिभंग मुद्रा शक्यतो वापरली जाते. शीर, धड आणि कंबर किंवा गुढघा.
ह्याच मुद्रांचे अबंग, समभंग, अतिभंग असेही प्रकार आहेत.
चित्र आंतरजालावरून.
भरतमुनींच्या अष्टनायिका पाहिल्या नाहीत कधी. पण हे सर्वच प्रकार खजुराहोतल्या मंदिरांवर मोठ्या नजाकतीने कोरलेले दिसतील.
बाकी मी लिहिलेल्या लेखांतील नावे ही मूर्तीशास्त्रातील तज्ज्ञांकदून माहित झालेली आहेत. पुस्तकांत बहुधा मी तरी वाचली नाहीत कुठे.
वरील त्रिभंगाच्या इथे दिलेल्या चित्रातील सर्व आकृतींचे चेहरे, छाती आणि कंबर समोरच्या बाजूनेच दिसते आहे (Front view) माझ्या माहितीप्रमाणे सबंध शरीर उभा पीळ दिल्यासारखे तीन ठिकाणातून वळलेले असते, त्याला 'त्रिभंग' म्हणतात. उदाहरणार्थ क्रमांक १० विषकन्या, आणि खिद्रापूरच्या जैन मंदिरातील दोन नायिका. शिल्पकलेच्या दृष्टीने अशी शिल्पे जास्त प्रगत होत. ही जास्त सुंदर, रमणीय, कमनीय वाटतात.
उदाहरणार्थ खालील शिल्पे: डावीकडील इजिप्शियन शिल्प ठोकळेबाज वाटते, तर उजवीकडील ग्रीक शिल्प (आणि त्याखालील फ्रेंच शिल्प) त्यामानाने खूपच खर्यासारखे, जिवंत वाटते.
..
.
.

Odalisque - Sculpture by French Artist James Pradier 1841
मी दिलेल्या चित्रातील शेवटची आकृती फक्त त्रिभंगाची. डावीकडून अभंग, समभंग, अतिभंग आणि शेवटी त्रिभंग असे प्रकार आहेत.
इजिप्शियन शिल्पे बरीचशी अभंग आणि समभंग यामध्ये मोडली जातात.
यातल्या माकडे ज्याना सतावत आहेत त्या अभिसारिका आहेत. प्रियकराला भेटायला जाताना कोणतेही संकट आले तरी न भिणार्या. साजशृंगार करणार्या वासकसज्जा. तर पायात पैंजण घालणार्या/आळिता लावणार्या स्वाधीनभर्तृका. (त्यांच्या पायाशी बसलेल्या आकृत्या सखीच्या नाही तर प्रियकराच्या असाव्यात.)
शुकाबरोबर असलेल्या नायिका प्रोषितभर्तृका, म्हणजे त्यांचे नायक दूरदेशी गेले आहेत आणि त्याला ही नायिका संदेश पाठवत आहे.
या नायिकांशी संबंधित राग रागिण्याही सांगितलेल्या आहेत. त्यांच्याबद्दल चौरा आणि चित्रगुप्त यानी विस्ताराने लिहावे ही विनंती.
भरतमुनिंच्या अष्टनायिकांखेरीज अन्य ग्रंथातील नायिकांची ही जंत्री:
स्वकीया, परकीया, पुनर्भू, सामान्या, मुग्धा, मध्या, प्रगल्भा, धीरा, धीराधीरा, अधीरा, ज्येष्ठा, कनिष्ठा, ऊढा, अनूढा, अन्य-संभोगदु:खिता, वक्रोक्तिगर्विता, प्रेमगर्विता, सौंदर्यगर्विता, मानवती, ज्ञातयौवना, अज्ञातयौवना, नवोढा, विश्रब्धनवोढा, गुप्ता, विदग्धा, वाग्विदग्धा, क्रियाविदग्धा, लक्षिता, कुलटा, अनुशयना, मुदिता, प्रोष्यत्पतिका, प्रवत्स्यत्पतिका, ज्योत्स्नाभिसारिका, शुक्लाभिसारिका, तमिस्त्राभिसारिका, कृष्णाभिसारिका, दिवसाभिसारिका, रक्ता, विरक्ता, निजतानुरागिनी, व्यंग्याविदग्धा, मर्मपीड़िता, अद्भुता, उद्भूदिता, आसाध्या, सुखसाध्या, कामवती, अनुरागिनी, प्रेमअशक्ता ...
याशिवाय वयाच्या दृष्टीने केलेले नायिकांचे वर्गिकरणः
देवी (वयवर्षे ७ पर्यंत)
देवगंधर्वी (वयवर्षे ७ - १४)
गंधर्वी (वयवर्षे १४ - २१)
गंधर्वमानुषी (वयवर्षे २१ - २८)
मानुषी (वयवर्षे २८ - ३५)
गूगल शोध घेतला असता येथे बरीच शिल्पे मिळतात. खजुराहो मैथुनशिल्पांमुळे उगा बदनाम झालेले आहे. वास्तविक पाहता अशी शिल्पे १० ते १५% च्या वर नाहीत. तरीही शोधात हीच शिल्पे समोर येतात. यातूनच चाळणी लावून नायिकांची काही शिल्पे मिळतीलच.
नायिका कश्याला म्हणायचे? हे राहूनच गेले.
बालिका, किशोरी, प्रौढा, स्त्री, नारी, अबला, यापेक्षा वेगळा खास शब्द 'नायिका' असल्याने त्याचा विशिष्ट अर्थ असणार. ('नायकीण' म्हटले, की आणखी वेगळी अर्थछटा प्राप्त होते).
नायिकांप्रमाणेच भरतमुनिंनी 'नायक' चार प्रकारचे सांगितले आहेतः
धीरललित, धीरप्रशान्त, धीरोदात्त, आणि धीरोद्धत.
अग्निपुराणात नायकांचे आणखी चार प्रकार सांगितलेतः अनुकूल, दर्क्षिण, शठ, आणि धृष्ठ.
(हे सर्व गूगलबाबाने सांगितले, पण यामुळे अग्निपुराण वगैरे वाचले पाहिजे, असे वाटते)
आताच माझ्या संग्रहातील फोटो धुंडाळता धुंडाळता खिद्रापूरच्या कोपेश्वर मंदिरातील ही शुकसारिका दिसली.
वर धाग्यातही अद्यतन केले आहेच. इथेही शुक मूर्तीभंजकांनी भग्न केलाय.
१) कुठे ही जाताना शिल्पे घाई घाईत पाहू नका.
२) त्या त्या काळची एकादी रीतभात शिल्पातून व्यक्त होउ शकते. उदा बेलूर ला उंच टाचेची चप्प्ल घालतेली बाई ( शिल्पातली )पाहिल्याचे आठवते.
३)एखादा प्रसंग चित्रित ( शिल्पित )केला असेल तर पात्रांचे भाव पहा !
४)दागदागिने , केशरचना, निरखून पहा.
५)शिल्पासाठी वापरलेल्या दगडाची बलस्थाने वा मर्यादा यांची माहिती शिल्पाद्द्लचे मत बनविताना जरूर घ्या
६)काही पुन्हा पुन्हा दिसणार्या मुद्रा उदा. सिंह मुख , ड्रॅगन सद्द्र्श राक्षस मुदा ई चा अभ्यास करा.
वरील नायिका या मुख्य नायिकाभेदातील उपभेद असाव्यात…
अ) धर्मानुसार भेद:
१) स्वीया अथवा स्वकीया: स्वत:ची पत्नी वा स्त्री
२) अन्या अथवा परकीया: दुसऱ्याची स्त्री
दोन प्रकार १) ऊढा- लग्न झालेली २) अनूढा लग्न न झालेली
३) साधारण- गणिका, वेश्या, पैश्यासाठी प्रेम करणारी
ब) वयोमानानुसार अथवा दशानुसार भेद:
१) मुग्धा: जिच्या अंग प्रत्यंगात नुकतेच यौवानाकुर फुलू लागले आहेत व जी कामक्रीडे विषयी संपूर्णपणे उनभिज्ञ आहे
दोन भेद: १) अज्ञात यौवाना: यौवानाची जाणीव नसलेली, २)ज्ञात यौवाना: यौवानाची नुकतीच जाणीव होवू लागलेली
२) मध्या: लज्जा व काम जिच्यात समप्रमाणात आहेत. ( जिला कामक्रीडा माहित आहे, आवड आहे, परंतु प्रचंड लाजाळू स्त्री )
३) प्रौढा: किंचित लज्जा व कामाचे परिपूर्ण आणि संपूर्ण कामकलेमध्ये प्रविण असलेल्या स्त्रिया. अथवा प्रगल्भा.
क) अवस्थानुसार भेद:
१) वासक सज्जा: प्रियकर घरी येणार म्हणून साजश्रुंगार करत नटणारी व त्यातच दंग असणारी स्त्री.
२) वीरहोत्कांठीता: प्रियकराच्या विरहाने व्याकूळ झालेली स्त्री.
३) स्वाधीनपतीका: पती जिच्या संपूर्ण अधीन आहे अशी स्त्री
४) कलहांतरिता: प्रथम प्रियकराशी भांडण उकरून काढणारी व तो रागावून निघून गेल्यावर भांडण मिटवण्यास उत्सुक असणारी पश्यातापदग्ध स्त्री
५) खंडिता: प्रियकराच्या अंगावर रतीचिन्हे पाहून रागावणारी, दु:ख,व्यक्त करणारी स्त्री
६) विप्रलब्धा: प्रियकराने सांगितलेल्या संकेतस्थळी येवून तो तेथे न आल्याने दु:खित झालेली स्त्री
७) प्रोषितपतिका: जिचा पती परदेशात गेला आहे अशी स्त्री
८) अभिसारिका: कामार्त होऊन कशाचीही लाजलज्जा न बाळगता प्रियकराला भेटण्यासाठी धावत सुटलेली स्त्री
ड) वर्णानुसार भेद:
१) दिव्या: देवांच्या ( ब्राह्मणांच्या ) स्त्रिया
२) आदिव्य: मानव स्त्रिया
३) दिव्या दिव्या: भूतलावर जन्म घेतलेल्या देव स्त्रिया. उदा. सीता
ई) प्रकृत्यानुसार भेद:
१) उत्तमा: पतीच्या सुखात आपले सुख मानणारी. तो कितीही हरामखोर असला तरी न रागावता स्वतः सदाचरण करणारी
२) मध्यमा: पतीचे दोष-गुण पाहून राग-लोभ-प्रेम व्यक्त करणारी
३) अधमा: पती कितीही चांगला वागला तरी दुराचरण करणारी
फ) स्वभावानुसार भेद:
१) अन्यसुरत दु:खिता: दुसऱ्या स्त्रीच्या अंगावर आपल्या पतीची रतीचिन्हे पाहून दु:ख करणारी स्त्री
२) मानवती: पतीचा अपराध त्याच्या लक्ष्यात आणून देणारी मानीपणा करणारी स्त्री
३) गर्विता:
प्रेमगर्विता: पतीच्या स्वतःवरील प्रेमाचा गर्व करणारी
रुपगर्विता: स्वतःच्या रूपाचा गर्व करणारी
गुणगर्विता: स्वतःच्या गुणाचा गर्व असणारी
मखर, अर्थात मकरतोरण
मखर, याचा उगम मकर अथवा मगरापासून होतो. मगरीच्या (मकराच्या) मुखातून निघालेले तोरण म्हणजे मकरतोरण. याचाच पुढे अपभ्रंश होत जाऊन आजचे मखर तयार झाले. काळानुरूप बदल होत जाऊन हल्ली तोरणाचा उगम मूळ मकरमुख जरी फारसे दिसत नसले तरी नक्षी मात्र अगदी तशीच आहे.
१. वेरूळच्या कैलास लेण्यातील गंगा. बघा ही मकरावर आरूढ असून तिच्या दोन्ही बाजूंच्या स्तंभांवर मकरतोरण आहे.
२. खिद्रापूरच्या कोपेश्वर मंदिरातील महावीराची प्रतिमा. मस्तकी असलेल्या कळसावर मकरतोरण आहे.
३. खिद्रापूरच्याच मंदिराच्या बाह्यभिंतीवरील अजून एक मकरतोरण
४. खिद्रापूरच्याच मंदिराच्या बाह्यभिंतीवरील अजून एक मकरतोरणांकित प्रतिमा
५. सिन्नरच्या गोंदेश्वर मंदिरातील स्तंभावरील माहेश्वरी (प्रतिहारी)
६. गोंदेश्वराच्याच स्तंभावरील अजून एक मकरतोरण
७. अंजनेरीच्य विष्णूमंदिरातील वैष्णव प्रतिहार
८. अंजनेरीच्या विष्णूमंदिराच्या बाह्य भागावरील मकरतोरणात असलेला विदारण नरसिंह
९. नारायणपूरच्या नारायणेश्वराच्या राऊळातील शैव प्रतिहार
१०. भुलेश्वर मंदिरातीलल मकरतोरण सभोवती असलेला भैरव प्रतिहारी
११. भुलेश्वरातील मकरतोरणांकित मूषकारूढ विनायकी, नंदीवर आरूढ असलेली माहेश्वरी आणि मयुरारूढ कौमारी
१२. भुलेश्वरातील मकरतोरणांकित प्रेतवाहिनी चामुंडा, गजारूढ ऐन्द्री
१३. सिन्नरच्या ऐश्वर्येश्वर मंदिरातील अत्यंत देखणे मकरतोरण. मध्यभागी शिवतांडवनृत्य
१४. हे मकरतोरण मात्र सर्वात अर्वाचीन. पुण्यातील त्रिशुंड गणपती मंदिराच्या दर्शनी भिंतीवर. १८ व्या शतकातील.
मखराची कूळकथा आवडली. तोरणात मकराला स्थान द्यायचं काय विशेष कारण असावं? मकर हे गंगेचं वाहन मानलं गेलं. गजेंन्द्र मोक्षाची कथा मकराशी संबंधित. तसाच "सुंदर ते ध्यान" अभंगात "मकर कुंडले तळपती श्रवणी" असा उल्लेख विठोबाच्या बाबत आहे. यात कुंडलांनाही मकराचा आकार आहे का?
तोरणात मकराला स्थान द्यायचे नक्की कारण माहीत नाही बहुतेक शिल्पात येणारी लयबद्धता हेही कारण असावे किंवा मकर पवित्र मानले जात असावे. बाकी मकर हे गंगेबरोबरच वरूणाचेही वाहन आहे. बाकी विष्णूच्या कानात मकर कुंडले असतात त्यामुळे विठोबाच्याही ती असल्यास त्यात काही नवल नाही.
हा वेरूळ लेणीतील मकरारूढ वरूण
आणि ही दिवेआगरमधली विष्णूच्या कानातील मकरकुंडले (१२ वे शतक)
भुलेश्वरातील तोरणावरील डिझाईन अप्रतिम, सिन्नरच्या ऐश्वर्येश्वर मंदिरातील तोरण पाहून हे दगडात कोरलेले मानवनिर्मित काम वाटतच नाही.
सध्या दिसणार्या मंदिरातील सोनेचांदीच्या प्रभावळीतपण मकर आहेच. पण या तोरणाच्या शीर्षस्थानी असणार्या मुखासंबंधी सांग ना. काही म्हणतात तो वीरभद्र तर काही महिष.
तोरणाच्या शीर्षस्थानी किर्तीमुख असते. थोडक्यात सिंहमुख.
मंदिरात येऊ पाहणार्या दुष्ट शक्तींना किर्तीमुखे रोखत असतात अशी मूळ धारणा.
अगदी पूर्वी वास्तु लाकडाच्या असत, त्यातील अवश्यक बाबी (उदा. लाकडी खांबांवर तुळया टाकताना दिलेले रुंद टेकू, तसेच तुळयांची भिंतींच्या बाहेर निघणारी टोके इ.) पुढे लेणी खोदताना आवश्यक नसूनही त्या खोदल्या जात. याची उदाहरणे आहेत का काही तुमच्या फोटोंमधे?..
तशी बरीच उदाहरणे आहेत.
हे पहा वेरूळचे सुतार लेणे. हे चैत्यगृह आहे. पण याची रचना हुबेहूब लाकडी कामासारखी केलीय.
हा पहा अजिंठ्याचा चैत्य. इथे छतावरील लाकडी फासळ्यांची जागा अखंड कोरीव दगडी फासळ्यांनीच घेतलीय.
आणि तुम्ही वर दिलेत तशा शैलीत असणारा देवगिरी किल्ल्यातील हा दगडी सज्जा.
मकर आणि नाग (आणि काही ठिकाणी सिंहसुद्धा) अतिपूर्वेला जाता जाता त्यांचा काल्पनिक संकर होऊन ड्रॅगन बनला असावा काय? ड्रॅगनही असाच प्रवेशद्वारावर अथवा घरावर पहारा देत दुष्ट शक्तींना पिटाळून लावतो असे तिकडे समजतात.
मकर आणि नाग (आणि काही ठिकाणी सिंहसुद्धा) अतिपूर्वेला जाता जाता त्यांचा काल्पनिक संकर होऊन ड्रॅगन बनला असावा काय?
त्याबद्दल नक्की काही सांगता येत नाही. पण जगातील बहुतेक प्राचीन संस्कृतींमध्ये काही ना काही गोष्टी समान आहेत. ड्रॅगनचे मूळ कितपत जुने ते काही माहित नाही.
पण हा अजिंठा लेणीतील १७ च्या क्रमांकाच्या विहारातील हे चित्र रोचक ठरावे.
प्रचलित हिंदू धर्मातील देवतांचे सगुण रूप
दोन महिन्यांपूर्वी हिंदू धर्मग्रंथाच्या कालाबद्दल एक लेखमाला मी उपक्रमवर लिहिली होती. त्या वेळी काही संदर्भ वाचन करत असताना एक प्रश्न माझ्या डोक्यात घोळत असे. सध्या आपण ज्या देवतांचे पूजन करतो त्या देवतांना सध्या प्रचलित असलेली त्यांची सगुण रुपे कोणी व कधी दिली असावीत? म्हणजे गणपतीला गजमुख दाखवायचा किवा शंकराला जटा व गळ्याभोवती नाग या स्वरूपातच दाखवायचा. लक्ष्मीला कमलपुष्पातच उभे करायचे.
यापैकी ही रुपे कधी दिली गेली असावीत या संबंधी अंदाज बांधणे त्या मानाने सोपे आहे. मोहोंजोदारो व हडाप्पा संस्कृतीमधे देवताना सगुण रूप होते परंतु त्या वेळी प्रजननक्षमता (Fertility) हीच देवता पूजत असत. या देवतेच्या सगुण रूपाला अदिती असे नाव होते असे काही तज्ञांचे म्हणणे. म्हणजे सध्याच्या प्रचलित देवता इ.स.पूर्व 1300 च्या आधी तरी नव्हत्या एवढे ढोबळपणे म्हणता यावे. आर्य टोळीवाले मूर्ती पूजकच नव्हते. त्यांचे देव म्हणजे इंद्र, वरुण, सूर्य, रुद्र व विष्णू. या देवतांचे पूजन ते अग्नीच्या माध्यमातून करत. आर्य संस्कृती भारतात रुजली तेंव्हाही सध्याच्या देवतांची सगुण रूपे नसणार. म्हणजेच आपण इ.स.पूर्व 1000 पर्यंत आलो. हा काल व इ.स,पूर्व 500 हा बौद्ध धर्माच्या उदयाचा काल या मधेच देवतांना सध्याची सगुण रूपे दिली गेली असावीत असे मला वाटते.
परंतु या सर्व देवतांना ही सगुण रूपे कोणी दिली असावीत याचा काहीही अंदाज मला तरी बांधता येत नाही. बघुया दुसर्या कोणी उपक्रमीला काही सांगता येते का?
त्यांचे देव म्हणजे इंद्र, वरुण, सूर्य, रुद्र व विष्णू. या देवतांचे पूजन ते अग्नीच्या माध्यमातून करत.
इंद्र, वरुण, सुर्य, रुद्र, विष्णू यांच्या पैकी बरेच जण खरेच (म्हणजे सगुणच)आर्य टोळ्यांचे नेते होते. अग्नीच्या माध्यमातुन पूजनाचा संबंध सरळसरळ यज्ञ व आहूतीशी संबंधित आहे.
आर्य संस्कृती भारतात रुजली तेंव्हाही सध्याच्या देवतांची सगुण रूपे नसणार.
सहमत.
मधेच देवतांना सध्याची सगुण रूपे दिली गेली असावीत असे मला वाटते.
सहमत. ही अशी रुपे देण्यामागे तत्कालिन समाजामनावर भीती, लालसा या बाबींचा वापर करुन अधिपत्य गाजवणारी व्यवस्था निर्माण करणे हा हेतू होता. हा हेतू आजतागायतही सफल झालेला आहे. ही सगळी सगुण रुपे होऊन गेलेल्या नायकांवर काल्पनिक देवत्व आरोपित करुन, त्यांच्या पराक्रमांच्या अतिरंजित कहाण्या निर्माण करुन त्यांच्या आधारे निर्माण करण्यात आली. या रुपांचा तत्कालिन नायकांच्या खऱ्या रुपाशी फारसा संबंध नसुन ती रचणाऱ्याच्या मानसिकतेत त्या रुपाच्या उपयोजनाची काय संकल्पना असेल त्यावर आधारीत आहेत. ही रुपे नायकांची असल्याकारणाने ती रचनाकर्त्यांच्या समुहाचेच प्रातिनिधित्व करणारी आहेत.
अवांतर
ही सगुण रुपरचना करतांना अर्थात खलनायकांचीही सगुण रुपे तयार करावी लागली. देवांचे नायक जसे चित्रित झाले तसे राक्षसांचेही खलनायक चित्रित करावे लागले. वास्तविक राक्षस हे ही अस्तित्वात असलेल्या भारतातील पूर्वप्रस्थापित टोळ्यांचे नायकच होते. परंतु ते शत्रु असल्या कारणाने त्यांची रुपे लांब नखे , सुळे दात, शिंगे, अस्ताव्यस्त वाढलेले केस, काळाकुट्ट रंग, गडगडाटी हास्य करणाऱ्या भेसूर मुद्रा अशा तऱ्हेची रेखाटली गेली. पण अशी काही मानवजात अस्तित्वात असावी असे वाटत नाही. आणि हे मानव नसुन हिंस्र पशू असते तर देवनायकांना त्यांच्याशी इतकी दमछाक होईपर्यंत लढायचे कारणही नव्हते. असो. जेणेकरुन या खलनायकांचे सगुणरुप चित्रण ही लबाडी आहे हे दिसून येते. तशीच देवदेवतांची सगुण रुपे तयार करणे हा ही एक लबाडीचाच भाग आहे.
आपल्या देवी देवतांना सगुण रुपे देण्यात राजा रविवर्मा आणि इतर चित्रकारांचा मोठा हात आहे. हल्लीच लोकप्रभामध्ये यावर लेख होता. येथे वाचा.
रविवर्मा यांनी लक्ष्मी आणि सरस्वती यांना नऊवारी साड्या आणि शिवलेले ब्लाऊज नेसवले. वीणा घेऊन मोरावर बसलेली सरस्वती आणि कमळात उभी राहिलेली लक्ष्मी यांना रेखाटताना त्यांनी एका पारशी महिलेला (लेखात पारशी माणसाची बायको असे म्हटले आहे परंतु काळ लक्षात घेता पारशी माणसाची पारशी बायकोच असावी असे वाटते.) मॉडेल म्हणून वापरले होते. ही चित्रे आज घराघरातून पूजली जातात. :-)
असो.
दुसर्या शतकातील शंकराची मूर्ती पहा. तिच्या गळ्यात नाग नाही. हातात त्रिशूळ आहे आणि शंकर मिशीधारी दिसतो. शंकराच्या हातातील त्रिशूळही पाश्चात्य ट्रायडेंटशी (पसायडन किंवा नेपच्यूनच्या हातातील) मेळ खातो. नंतरच्या चित्रांत मात्र त्रिशूळाचा आकार आणि स्वरुप बदलेले दिसते. (असेही असू शकेल की ही मूर्ती गांधारातील असल्याने वेगळी घडवली असेल.)
पूजेसाठीचे ढोबळ पिंड "सगुण" म्हणून चालेल का?
पूजनासाठी ढोबळ पिंडे (शेंदूर फासलेले, कधीकधी मोठे डोळे चितारलेले लंबगोल पाषाण) ही बहुधा फार प्राचीन काळापासून वापरात असावी. या वेगवेगळ्या "आया" आणि "बा" आहेत.
काही भक्तश्रीमंत ग्रामदैवतांची ओळख प्रमुख पौराणिक देवांशी जुळवल्याच्या घटना अगदी अलिकडे सुद्धा दिसतात.
खंडोबाचा शंकराशी संबंध, महाराष्ट्रातील बहुतेक आयांचा पार्वतीशी संबंध, काही आयांचा विष्णुपत्नीशी संबंध, लिंगरूप दैवताचा वैदिक रुद्राशी संबंध...
असे करता पौराणिक/वैदिक देवाला दृश्य-स्पर्शरूप मिळते. ते दृश्य-स्पर्शरूप लोकांमध्ये आधीच पूजनीय असल्यामुळे, त्या पिंडाची पूजनीयता नव्याने पटवून द्यावी लागत नाही.
दा. ध. कोसंबी यांच्या "मिथ अँड रिऍलिटी" मध्ये महाराष्ट्रातील अनेक आई-देवतांबद्दल समूळ संशोधनासहित चर्चानिबंध आहे. त्यात काही वैदिक/पौराणिक<->लौकिक/स्थानिक दैवतांच्या जोड्यांची चर्चा सापडेल - जोड्यांमधली दैवते मुळात वेगळी असली तरी क्षेत्रमाहात्म्यात अभेद झालेली आहेत.
मनुष्याकार नसलेल्या पूजनीय पाषाणांवरती मनुष्याकृती मुखवटे चढवतात, ही प्रथा तर सर्वांच्या ओळखीचीच असेल. गोव्यातील शंकरांच्या पिंडींवर मुखवटे असतात. हल्लीच वैष्णोदेवीच्या देवळात गेलो, तिथे दैवते अखंड नैसर्गिक अभिषेक होत असलेले "स्टॅलॅक्टाइट" आहेत. पण त्यांच्यापुढे देवीचा घडीव मुखवटा आहे.
कोकणातल्या एका घरगुती पूजाविधीमध्ये देवीचा मुखवटा तांदळाच्या उकडीने बनवतात. या रूढीत सुद्धा काहिशा-निर्गुण पिंडाला दिखाऊ सुंदर सगुण रूप देण्याची लोकपरंपरा दिसते, असा माझा कयास आहे.
पुरीच्या जगन्नाथाच्या कथेतून सगुण-निर्गुण पिंडांबद्दल लोकांच्या श्रद्धेमध्ये जो तणाव आहे, त्याचे अंशदर्शन घडते. (राजाला जगन्नाथाची मूर्ती सुबक बनवायची होती, पण विश्वकर्म्याने ढोबळ पिंडे बनवली...)
मूर्तीपूजा अस्तित्वात आल्यावर प्रत्येक कालखंडातील शिल्पकार, चित्रकार यांनी आपापल्या कुवती आणि समजानुसार देवांना रेखाटले असावे.
पुरीच्या जगन्नाथाच्या कथेतून सगुण-निर्गुण पिंडांबद्दल लोकांच्या श्रद्धेमध्ये जो तणाव आहे, त्याचे अंशदर्शन घडते. (राजाला जगन्नाथाची मूर्ती सुबक बनवायची होती, पण विश्वकर्म्याने ढोबळ पिंडे बनवली...)
सहमत आहे. गणपतीच्या बहुतांश देवळांतील मूर्ती (त्यांना मूर्ती तरी म्हणावे का नाही असा संभ्रम होतो) ढोबळ असतात. गणेशोत्सवातल्या गणपतीसारख्या मूर्ती सहसा देवळात नसतात. शंकराच्या देवळात सहसा पिंडच असते.
वैष्णव देवळांतल्या (राम, कृष्ण, दत) मूर्ती मात्र सुबक असतात का? हे अर्वाचीन देव (दत्त अर्वाचीन आहे यात शंका नाही) असावेत का?
बाबासाहेब जगताप यांनी म्हटल्याप्रमाणे सरंजामशाहीत एखाद्यावरील अतिरेकी निष्ठा हा गुण आवश्यक होता. त्या गुणाचा विकास करण्याचे काम भक्तीमार्गाच्या प्रसारातून साधले गेले.
गणपतीला गजमुख दाखवणे हे किमान ९ व्या शतकाआधीपासून असावे असे विकीपीडियाच्या संदर्भावरून वाटते. ११ व्या शतकापूर्वी गणपतीचे सध्याचे रूप व्यवस्थित प्रचलित झाले होते असे वाटते. विकीवरच श्रीलंकेत २र्या शतकातली गणपतीची या प्रकारची मूर्ती आहे असे म्हटले आहे. पण मूर्तीच्या चित्राचा दुवा मिळाला नाही.
कमळ हे भारतीय साहित्यात खूपच महत्त्वाचे फूल आहे. ऋग्वेदातही सरस्वती नदीच्या पात्रातील कमळांचा उल्लेख आहेच. नंतरच्या काळात शिल्पकलेतही याचा उपयोग आहेच. गजलक्ष्मीचे बर्यापैकी प्राचीन बौद्ध शिल्प (शुंग काळ, ख्रिस्तपूर्व १ -२ शतके) - यात हत्ती, अर्थातच पण पायाशी कमळही आहे.
काही अधिक चित्रे इथे -
आपल्या' माणसासारखी मार्तंड भैरवाची मुर्ती - राजेंद्र गलांडे.
जगातील पहिले व्यंगचित्र ( शिल्प ) - महेन्द्र शेगावकर
नवदुर्गा ९ दिवस ९ मूर्ती
मुर्ती मालिका -१
जय देव जय देव जय व्यंकटेशा
मुर्ती मालिका -२
शेंदूर्णीचा त्रिविक्रम विष्णु
मुर्ती मालिका -३
१४ हातांचा विदारण नरसिंह
मुर्ती मालिका -४
अनंतशयन विष्णु
मूती मालिका -५
भक्ताची भव्य मूर्ती (औंढा नागनाथ, जि.हिंगोली)
मूर्ती मालिका -६
रावणानुग्रह मूर्ती (औंढा, हळेबीडू)
मूर्ती मालिका - ७
नृत्य गणेश (होट्टल, ता. देगलूर, जि. नांदेड)
मूर्ती मालिका - ८
सूर्य नारायण मूर्ती (होट्टल, ता. देगलूर, जि. नादेड)
मूर्ती मालिका -९
नर्तकाची देखणी मूर्ती
मूर्ती मालिका -१०
मूर्ती मालिका -११
मूर्ती मालिका -१२
औंढ्या नागनाथचा केवल शिव
मूर्ती मालिका -१३
मूर्ती मालिका -१४
मूर्ती मालिका - १५
येरगी येथील काळम्मा
मूर्ती मालिका -१६
(छायाचित्र Vincent Pasmo
मूर्ती मालिका - १७
मूर्ती मालिका - १८
उमा महेश्वर (सिद्धेश्वर मंदिर, लातुर)
मूर्ती मालिका -१९
छायाचित्र सौजन्य
विष्णुची शक्तीरूपे
मूर्ती मालिका -२०
द्राक्ष सुंदरी
मूर्ती मालिका -२१
मूर्ती मालिका -२२
भव्य द्वारपाल
मूर्ती मालिका - २३
मूर्ती मालिका - २५
मूर्ती मालिका २६
उकिरड्यावर पडलेले होट्टलचे शिल्पवैभव
उरूस, 22 जानेवारी 2020
नांदेड जिल्ह्यात देगलूर तालूक्यात तेलंगणा सीमेवर होट्टल नावाचे गांव आहे. चालूक्यांची उप राजधानी असलेले हे गांव शिल्पवैभवाने अतिशय समृद्ध आहे. या गावांतील दोन मंदिरांचा जिर्णोद्धार करण्यात आला. आज याच मंदिरांच्या परिसरात होट्टल महोत्सवाचे आयोजन करण्यात येते आहे. एक हजार वर्षांपूर्वीची ही अतिशय समृद्ध अशी नगरी. जूने भक्कम दगडी वाडे आजही गावात आहेत. परिसरांतील 22 गावे ज्यांच्या देशमुखीखाली होती अशा तालेवार देशमुखाची प्रचंड गढी या गावात आहे. गढीची पडझड झालेली असली तरी प्रवेशद्वार आणि त्या भोवतीची भक्कम भिंत जून्या वैभवाची साक्ष देते.
मुख्य महादेव मंदिराचे चिरे, नक्षीदार 20 खांब, बाह्यांगावरच्या सूरसूंदरींची शिल्पे, नृत्य गणेशाचे अप्रतिम शिल्प यांचा शोध घेवून मंदिराचे बांधकाम परत करण्यात आले. स्थानिक पाथरवटांचे सहकार्य घेत रिकाम्या जागी त्याच आकाराचे दगड कलात्मक रित्या बसविण्यात आले. राष्ट्रीय पातळीवर काम करणार्या इनटॅक्ट (इंडियन नॅशनल ट्रस्ट फॉर आर्ट ऍण्ड हेरिटेज) संस्थेच्या सहकार्याने गुरूतागद्दी सोहळ्याच्या निधीतून या कामासाठी काही निधी उपलब्ध करून देण्यात आला.
जिर्णाद्धार झालेली दोन मंदिरे पाहून एकीकडे पुरातन ठेव्याबद्दल अभिमान वाटत असतानाच समोर येते दुसरे भग्न मंदिर. जमिनीखाली अर्धे गाडले गेलेले हे मंदिर आपल्या शिल्पवैभवाने एकीकडे पाहणार्याचे डोळ्याचे पारणे फेडते आणि परिसराची दुर्दशा बघून डोळ्यात पाणीही आणते.
मंदिराच्या परिसरांत कित्येक शिल्पे विखुरलेली आहेत. काही शिल्पांभोवती उकिरडा साठला आहे. प्रातर्विधीसाठी लोक या जागेचा वापर करताना पाहून त्याच दगडांवर डोके आपटून घ्यावे अशी भावना दाटून येते. मंदिर परिसरांत दगडी बांधकाम असलेली बारव आहे. तिथे प्रचंड झाडी गवत वाढले आहे. पाण्याचा उपसा नसल्याने हिरवट शेवाळ्याचा थर साचला आहे. गाळ प्रचंड असल्याने पाण्याला दुर्गंधी येते आहे. निगराणी अभावी दगडी चिरे ढासळून गेले आहेत.
पुरातत्व विभाग काय करतो आहे? किंवा लोकप्रतिनिधी सरकारी अधिकारी काय करत आहेत? या सोबतच आधी सामान्य नागरिक म्हणून आपण या पुरातत्वीय महत्त्वाच्या ठेव्याची अशी अवहेलना का करतो आहोत? हा प्रश्न सतावतो. या मंदिराच्या परिसराची किमान साफसफाई, कुंपण घालून त्याचे संरक्षण इतकी साधी गोष्ट आपणाला का जमत नाही?
एक शिव-हरेश्वराची सुंदर मुर्ती गावात नालीच्या कडेला पडून आहे. हत्तीचे सुंदर शिल्प उकिरड्यावर लोळत आहे. होट्टल महोत्सव पाहण्यासाठी आलेला व्हिन्सेंट पास्किलीनी हा परदेशी फ्रेंच प्रवासी उपहासाने म्हणाला, ‘तूम्ही भारतीय इतके श्रीमंत अहात की अप्रतिम अशी शिल्पे तूम्ही उकिरड्यार फेकून देता.’ आता या उद्गारावर काय प्रतिक्रिया द्यावी?
ज्या मंदिराचा जिर्णोद्धार केला गेला आहे तेथपासून ते जमिनीत गाडल्या गेलेल्या दुसर्या मंदिरापर्यंत सरळ असा दगडी मार्ग असल्याचे अभ्यासक सांगतात. रस्त्यात असलेल्या मानवी वस्तीचे अतिक्रमण काढले तर हा संपूर्ण मार्ग दृष्टीपथास येवू शकतो.
आजही दगडी काम करणारे कारागीर येथे आहेत. त्यांची काम करण्याची तयारी आहे. त्यांचा तो पोटपाण्याचा उद्योग असल्याने गरजही आहे. मग या पाथरवटांच्या साहाय्याने ही कामं आपण का नाही मार्गी लावू शकत? निवेदनं द्या, प्रस्ताव तयार करा, मग सरकारी पातळीवर हालचाली होणार, सरकारी पातळीवरची उदासीनता हे सगळं असह्य आहे. आपल्या लोकप्रतिनिधींना याची जाण जेंव्हा येईल तेंव्हा येईल पण आधी किमान आपण स्थानिक पातळीवर शक्य होईल ते काम केले पाहिजे. त्यासाठी गावकर्यांनी आधी पुढाकार घेतला पाहिजे.
मंदिरांचा जिर्णोद्धार, परिसराची स्वच्छता, होट्टल पर्यंत येण्यासाठी पक्क्या चांगल्या रस्त्याचे निर्माण यातून मोठ्या प्रमाणात स्थानिक रोजगार निर्मिती होईल. केवळ चर्चा करण्यापेक्षा आपण कृती करू या.
होट्टल असो की चारठाणा की मराठवाड्यातील अजून इतरत्र असलेली जूनी मंदिरे आणि प्राचीन वारसा सांगणार्या वास्तू यांचे जतन करण्यासाठी आपण सगळे मिळून चळवळ उभारू या. ज्यांना ज्यांना या कामात सहभागी होण्यात रस आहे, इच्छा आहे, मदत करायची आहे, सुचना आहेत, जे अभ्यासक आहेत त्यांनी संपर्क साधावा. आपण सगळे मिळून मराठवाडा पातळीवर ऐतिहासिक वारसा जतन चळवळीची उभारणी करू या. श्रीकांत उमरीकर 9422878575
संस्कृती संवर्धनाचा चारठाणा पॅटर्न सर्वत्र राबवूया !
सोमवार दि. 13 जानेवारी 2020
या लेखासाठी वापरेले चित्र चारठाणा येथील अतिशय वैशिष्ट्यपूर्ण अशा मानस्तंभाचे चित्र आहे. संपूर्ण महाराष्ट्रात असे केवळ तीन स्तंभ आहेत. पहिला स्तंभ सातवाहनाच्या काळातील पैठण येथे आहे. दुसरा स्तंभ त्यानंतर जवळपास आठशे वर्षांनी खोदलेल्या कैलास लेण्यात आढळून येतो. आणि तिसरा स्तंभ त्यानंतर चारशे वर्षांनी उत्तर चालूक्य किंवा यादवांच्या काळातील चारठाणा (ता. जिंतूर, जि. परभणी) येथे आहे.
रविवार दिनांक 12 जानेवारी 2020 ला या गावात वारसा पदयात्रा (हेरिटेज वॉक) चे आयोजन ग्रामस्थ, इतिहास प्रेमी, परातत्त्व अभ्यासक, कलाकार यांनी केले होते. या पदयात्रेत सामील चित्रकार सरदार जाधव यांचे पाय या स्तंभाजवळ येताच खिळून राहिले. सोबतचे पुढे निघून गेले तरी सरदार जाधव त्याच जागी बसून राहिले. खाणं पिणं विसरून त्यांनी तीन तासांत हे अप्रतिम असे चित्र रेखाटले.
हा स्तंभ जैनमंदिर वास्तुशास्त्राचा एक भाग असल्याची माहिती भरपुर अभ्यास करून इतिहास अभ्यासक तज्ज्ञ लक्ष्मीकांत सोनवटकर यांनी मांडली. अगदी स्तंभावरील मातृका शिल्पांचा बारीक बारीक तपशील सांगत आपल्या मताला पुष्टी दिली. ज्या दिशेला मुर्ती आहे त्या दिशेचेही संदर्भ जेंव्हा त्यांनी दिले तेंव्हा इतिहास अभ्यासक तर सोडाच पण सामान्य दर्शकांनीही तोंडात बोटे घातली.
आज या स्तंभाच्या परिसरात अक्षरश: उकिरडा झालेला आहे. सामान्य लोक या परिसरात प्रात:विर्धी करत आहेत. स्तंभाच्या जवळच शीरच्छेद झालेली अशी यक्षाची मुर्तीती भग्न अवस्थेत पडून आहेत.
या स्तंभाच्या पूर्वेला मंदिराचे प्रवेशद्वार असावे अशी रचना मातीच्या ढिगार्यात स्पष्ट आढळून येते. या परिसराचे उत्खनन केल्यास मंदिर सापडण्याची शक्यता दाट आहे. पण केवळ आणि केवळ आपल्या अनास्थेपोटी हा सगळा परिसर उद्ध्वस्त होण्याच्या मार्गावर आहे. या अभियानात लोकांनी परिसराची साफसफाई केली. किमान जाण्यासाठी वाट तरी तयार झाली. स्तंभाच्या दगडी पायाजवळ जागा स्वच्छ झाली. पण बाकी परिसर वाढलेला झाडोरा, बाभळीची झाडे, घाण कचरा अजून शिल्लक आहे.
असे वातावरण असताना व्हिन्सेंट पास्किलीनी हा फ्रेंच पर्यटक डिसेंबर 2018 ला या गावी आला. येथील पुरातन वारसा पाहून त्याला प्रचंड असे कुतूहल निर्माण झाले. या गावाला ‘हेरिटेज व्हिलेज’ दर्जा मिळावा म्हणून प्रयत्न करण्याची गरज त्याने बोलून दाखवली. त्याची तळमळ पाहून ग्रामस्थ, इतिहास अभ्यासक, पुरातत्त्व तज्ज्ञ यांनाही या विषयाचे गांभिर्य लक्षात आले.
पाहता पाहता वर्षभर विविध घटक कार्यरत झाले. रवी पाठक सारखा एक चित्रपट दिग्दर्शक या पसिरावर अतिशय सुंदर असा माहितीपट (डॉक्युमेंटरी) तयार केली. लक्ष्मीकांत सोनवटकर सारखे इतिहास अभ्यासक या पसिराची माहिती गोळा करून त्याचे पुस्तक करण्याच्या मार्गाला लागले आहेत. येथील मंदिर शिल्पातील नृत्य करणार्या अप्सरा, त्यांच्या हातातील वाद्ये यांची माहिती होताच महागामी गुरूकुलाच्या सुप्रसिद्ध नृत्यांगना पार्वती दत्ता या गावात सांस्कृतिक वारसा सप्ताहाचे आयोजन करून त्यात गायन वादन नृत्य सादर व्हावे अशी आग्रही मागणी केली आहे. डॉ. दुलारी गुप्ते कुरेशी, डॉ. प्रभाकर देव, सुरेश जोंधळे यांच्यासारखे तज्ज्ञ प्रत्यक्ष या सांस्कृतिक वारसा पदयात्रेत सामील होवून या अभियानाला नैतिक बळ पुरवत आहेत. नानासाहेब राऊत सारखे लोकप्रतिनिधी स्थानिक व्यवस्था काटेकोरपणे राबवून पाहूण्यांचे आगत स्वागत आस्थेने करत आहेत. गावाच्या भल्यासाठी गावकर्यांकडून संपूर्ण सहकार्य करण्याची केवळ हमीच देत नाहीत तर तसे प्रत्यक्ष कृतीतून सिद्ध करत आहेत.
सांस्कृतिक जागृती अभियानाच्या आठवडाभर आधीपासून गावात ग्राम स्वच्छता अभियान चालू करण्यात आले होते. उर्दू शाळेतील मुसलमान मुला मुलींनी गावातील उकंडेश्वर मंदिराची साफसफाई करून उदारामतवादी सहिष्णु परंपरेचा एक जिवंत पुरावाचा दिला. माजी सरपंच अजगर देशमुख यांनी पुढाकार घेवून सर्व मुस्लिम समाज या अभियानात सहभागी केला. या भागांतील सुफी संतांच्या दर्ग्यांच्या परिसरांतही अभियान राबविण्याची तयारी दर्शविली.
भारताची संस्कृती जनजीवन संपन्न वारसा चालीरिती समजून घेण्यासाठी परदेशी विद्यार्थी आपल्याकडे आणि आपले विद्यार्थी परदेशात अशी एक योजनाच रोटरी क्लबच्या वतीने राबविण्यात येते. चित्रकार, पुराण वस्तुच्या संग्राहक, पर्यटक मेधा पाध्ये या अशा तीन परदेशी विद्यार्थ्यांना घेवून या अभियानात सहभागी झाल्या होत्या. या परदेशी विद्यार्थ्यांनी आवर्जून भारतीय वेष परिधान केला होता. शिवाय इतर गावकर्यांसोबत मांडी घालून पत्रावळीवर जेवण केले.
प्रा. शिवा आयथळ हा परभणीच्या ज्ञानोपासक महाविद्यालयातील विज्ञानाचा प्राध्यापक. मूळचा कर्नाटकातील असलेल्या शिवाचा जन्म परभणीचाच. कर्नाटकांत संस्कृती संवर्धनाची जी जागृती आहे ती आपल्या जन्मभूमीत मराठवाड्यात नाही याची खंत त्याला वाटते. चारठाण्याच्या अभियानात तो उत्स्फुर्तपण सहभागी झाला. आपल्या कॅमेर्याने हे अभियान टिपताना त्याने उत्कृष्ठपद्धतीने आपल्या फर्ड्या इंग्रजीत लिहून काढले. समाज माध्यमातून त्याची हा विषय जगभर पोचविण्याची त्याची ही प्रामाणीक धडपड फार महत्वाची आहे.
शाश्वत पर्यटनासाठी झटणार्या आकाश धुमणे या तरूणाने औरंगाबादेतून सर्व तज्ज्ञ अभ्यासकांना मुद्दामहून गाडी करून या पदयात्रेसाठी आणले. मराठवाडा परिसरात शाश्वत पर्यटन वाढावे यासाठी गेली तीन वर्षे व्हिन्सेंट या फ्रेंच मित्राच्या सहकार्याने हा तरूण प्रयत्न करतो आहे. परदेशातील पर्यटक आपल्या संपन्न सांस्कृतिक वारश्याकडे आकर्षित करण्यासाठी केला जाणारा हा प्रयास प्रशंसनीय आहे. पर्यटकांना अजिंठा वेरूळ बिबी का मकबरा देवगिरी किल्ला या शिवाय दाखवायला खुप काही आपल्याकडे आहे हेच लक्षात घेतले जात नाही. केवळ जून्या वास्तुच नव्हे तर आपली परंपरा, जत्रा, सांस्कृतिक महोत्सव, संगीत, खाद्य पदार्थांचा आस्वाद या पर्यटकांना दिला पाहिजे या बाबत शाश्वत पर्यटन आग्रही आहे.
पर्यटकांना राहण्यासाठी आपले जूने वाडे डागडुजी करून वापरता येवू शकतात. आपला परिसर तेथील जनजीवन या सर्वांचा विचार शाश्वत पर्यटनात केला जातो. मराठवाड्यातील वस्त्र विणण्याची अतिशय मोठी समृद्ध अशी परंपरा पर्यटकांना आकर्षित करू शकते. पण यासाठी वेगळे असे प्रयत्न होताना दिसत नाहीत.
मल्हारीकांत देशमुख सारख्या परभणीच्या चळवळ्या पत्रकाराने वंशपरंपरागत त्याच्या घराण्यात या चारठाणे गावची चारआणे देशमुखी होती हे ऋण ध्यानात ठेवून या सगळ्या प्रकल्पाला गती दिली. घरात दु:खद प्रसंग घडला असतानाही वैयक्तिक दु:खावर मात करून अभियानाला बळ पुरवले हे विशेष.
चारठाण्याच्या सांस्कृतिक वारसा पदयात्रेच्या निमित्ताने मराठवाड्यातील कितीतरी सांस्कृतिक विषय ऐरणीवर आले आहेत. मराठवाड्यातील जाणत्या विचारी लेकांनी एकत्र येवून या विचारपुर्वक कृती करण्याची गरज आहे. सरकारी यंत्रणेत काम करणारे अधिकारी आपल्याच समाजाचा एक घटक आहेत. त्यांच्याकडून आपल्या परिसरांतील शाश्वत पर्यटनाच्या संधी शोधून त्यांचा विकास करण्याची गरज आहे. राजकीय नेते शेवटी आपणच निवडून दिलेले आहेत. त्यांच्यावर जनतेचा दबाव या कामांसाठी आपणच निर्माण करावा लागणार आहे. चारठाण्याच्या ग्रामस्थांनी एक पाऊल पुढे टाकले आहेच. संपूर्ण मराठवाड्यात अशी जागृती होण्याची गरज आहे.
सुरेश जोंधळे यांनी नांदेड जिल्ह्यात होट्टल महोत्सवाच्या माध्यमांतून एक मोठे काम आधीच सुरू केले आहे. शिवरात्रीला औंढा नागनाथ येथे सांस्कृतिक महोत्सव घेता येवू शकतो. जालना जिल्ह्यात अंबडला दत्तजयंतीला संगीत महोत्सव गेल्या कित्येक वर्षांपासून चालू आहे. या वर्षी तो होवू शकला नाही. त्याकडे लक्ष देण्याची गरज आहे. अंबडला असलेली जूनी मंदिरे बारवा या ठिकाणीही हेरिटेज वॉक आयोजीत करता येवू शकतो. उस्मानाबाद येथील माणकेश्वर मंदिर अप्रतिम वास्तुकलेचा नमुना आहे. जालना जिल्ह्यातीलच भोकरदन तालूक्यातील अन्व्याच्या मंदिरातील शिल्पसौंदर्य चकित करणारे आहे. त्याचीही दखल घेतली गेली पाहिजे. मराठवाड्यात किमान 25 जूनी अप्रतिम मंदिरे डॉ. प्रभाकर देव यांनी अधोरेखीत केली आहेत. त्या त्या स्थळी हेरिटेज वॉक आयोजीत करून जागृती घडविता येवू शकते.
अंबाजोगाई तर मराठी भाषेचे जन्मस्थान आहे. या परिसरांत सांस्कृतिक महोत्सवाचे आयोजन करता येवू शकते.
चला मित्रांनो संस्कृती संवर्धनाचा चारठाणा पॅटर्न सर्वत्र राबवू या !
प्राचीन भव्य गणेशमुर्तीच्या निमित्ताने
13 सप्टेंबर 2019
अनंत चतुर्दशीच्या निमित्ताने एका भव्य गणेशमुर्तीचे छायाचित्र फेसबुकवर टाकले. बाजूच्या नयन्यरम्य धबधब्याचेही छायाचित्र सोबत होते. त्या परिसरातील तीघे व सोबत जो होता तो तरूण मित्र वगळता कुणालाच ते ठिकाण ओळखता आले नाही. मला खंत वाटली. आपल्या परिसरातील एक भव्य अशी गणेशमुर्ती निसर्गरम्य परिसरांत असताना आपण ती पहात नाहीत, त्याची किमान माहितीही नसते. आपली पुरातन स्थळांबाबतची ही अनास्था चिंताजनक आहे.
एक कॉम्रेड मित्राने तर ‘शेतकरी संघटनेचे असून तूम्ही गणपती बाबत पोस्ट टाकतात..’ असाही आक्षेप घेतला.
अजिंठ्याच्या डोंगरांमध्ये निसर्गरम्य अशा परिसरात एकूण 5 किल्ले आहेत. प्राचीन लेण्या, मंदिरे, जंगल यांनी हा परिसर समृद्ध आहे. बहुतेकांना केवळ अजिंठ्याचीच माहिती असते. अगदी अजिंठा गावाचीही माहिती नसते.
ही गणेशमुर्ती अजिंठा डोंगरांतील वेताळ वाडी किल्ल्या जवळील रूद्रेश्वर लेण्यांतील आहे. अजिंठा गावाच्या अलीकडे डाव्या बाजूला एक रस्ता ‘अजिंठा व्ह्यु पॉईंट’ कडे जातो. या ठिकाणाहून अजिंठा लेणीचे नयनरम्य असे दृश्य दिसते. या रस्त्यावरून पिंपळदरी गावापासून डावीकडे जो रस्ता जातो त्या रस्त्यावर हळदा म्हणून गाव आहे. याच हळद्याच्या पुढे वेताळवाडीचा किल्ला आहे. या ठिकाणाला अजिंठा रोडवरून गोळेगांवपासून उंडणगाव मार्गाने पण जाता येते. हा रस्ता हळदा घाटामुळे अजूनच जास्त निसर्गरम्य आहे.
वेताळवाडीचा किल्ला यादवांच्या काळातील असून देवगिरी किल्ल्यापेक्षाही प्राचीन आहे. वेताळवाडी किल्ल्याला वळसा घालून सोयगांव रस्त्यावर जाताना वाडी गावांतून एक छोटी वाट रूद्रेश्वर लेणीच्या डोंगराकडे जाते. काही अंतरावर ही कच्ची सडक आहे. वाटेत तीन मोठे खळाळणारे झरे लागतात. ते ओलांडून गेल्यावर रूद्रेश्वर डोंगराची प्रत्यक्ष चढण सुरू होते. या जागेपासून दगड मातीची पायवाट लेणीपर्यंत पोचते.
डोंगरमाथ्यावरून कोसळणार्या सुंदर धबधब्याने दगड कापत कापत एक सुबक अशी खोबण तयार केली आहे. याच खोबणीत रूद्रेश्वर लेणी कोरली गेली आहे. ही लेणी अजिंठा लेणीच्या काळातील आहे. म्हणजे जवळपास दोन हजार वर्षांपूर्वीची ही लेणी आहे. लेणीसाठी डोंगरावरून उतरणारी एक अवघड अशी पायवाट आहे.
लेणीत महादेवाची सुंदर अशी पिंड, समोर सुबक नंदी आहे. या लेणीतील खरे आकर्षण म्हणजे वरच्या छायाचित्रात असलेली गणेशमुर्ती. सहा फुटाची भव्य अशी ही गणेशमुर्ती दगडांत कोरलेली आहे. एकसंध दगडांत कोरलेली इतकी प्राचीन दुसरी गणेशमुर्ती महाराष्ट्रात नाही. उजवा पाय उंचावलेला व डावा पाय दुमडलेला अशी ही देखणी गणेशमुर्ती आहे. कमरेला नागाने वेढा घातलेला आहे. शेंदूर फासल्याने मुळचे सौंदर्य लक्षात येत नाही. मुर्तीची भव्यता डोळ्यांत सहज भरते. समोरच्या दरवाज्यांतून वरून पडणार्या पाण्याचा अखंड नाद कानात घुमत राहतो.
मुर्तीसमोरच्या छोट्या ओटयावर डोळे मिटून हात जोडून बसल्यास हा पाण्याचा नाद अथर्वशिर्ष उच्चारत असल्याचा भास होत राहतो. (हे वाचून माझ्यावर हिंदुत्ववादी असल्याची ज्यांना टिका करावयाची आहे त्यांना खुली सुट आहे)
या मूर्ती शेजारी उग्र नरसिंहाचे शिल्प कोरलेले आहे. गणपतीच्या बाजूला नरसिंह असे इतरत्र कुठेच आढळत नाही. डाव्या बाजूला वीणावादिनी सरस्वतीचे शिल्प आहे.
वरतून कोसळणार्या धबधब्याच्या पाण्यातूनच लेणीत जाता येते. पावसाळा उताराला लागतो तेंव्हा ही धार बारीक होवून जाते. उन्हाळ्यात मग धबधबा पूर्णच कोरडा पडतो. तरी समोरच्या कुंडात थोडे पाणी साठलेले असते.
यादव सम्राट भिल्लम देव याच्या काळातील पुरातन किल्ला या लेणीच्या समोरच आहे. या किल्ल्याला भक्कम अशी तटबंदी आहे. जवळपास सर्वच तटबंदी अजून शाबूत आहे. दोन मोठे भक्कम दरवाजे या किल्ल्याला आहेत. किल्याच्या डोंगरावरच एक लेणी अजून दुर्लक्षीत अवस्थेत आहे. झाडांनी झाकलेला तिचा काही भाग फक्त दिसतो. अजून तिथले संशोधन उत्खनन शिल्लक आहे. या लेणीला जायला रस्ता नाही.
वाडीच्या किल्ल्याच्या संवर्धनाचे काम चालू आहे. अधी तर किल्ल्यावर जायला नीट रस्ताच नव्हता. गुराख्यांनी जी पायवाट तयार केली तिनेच जाता यायचे. आता दगड फोडून एक जरा बर्यापैकी रस्ता तात्पुरता तयार केला गेला आहे. पण अजून भरपुर काम बाकी आहे. किल्ल्यावर उत्तर बाजूला पडून गेलेल्या हवामहलाच्या सुंदर चार कमानी शिल्लक आहेत. या कमानीतून खानदेशचा परिसर दिसतो. हे ठिकाण म्हणजे दक्षिण भारताचे उत्तरेकडील महाद्वारच होय. या घाटांतून पूर्वीच्या काळी वाहतूक व्हायची. उत्तर दक्षिणेला जोडणार्या रस्त्यावरचा हा किल्ला आहे. सामरिक दृष्ट्या या किल्ल्याचे स्थान महत्त्वाचे आहे.
अशी प्राचीन ऐतिहासिक पुरातत्वीय दृष्ट्या महत्त्वाची निसर्गरम्य स्थळे आपल्या अगदी जवळ असून (औरंगाबाद करांसाठी) दुर्लक्षीत आहेत. मराठवाडा बाहेरच्या लोकांना याची माहिती नसणे समजू शकतो. पण मराठवाड्यांतील किंवा अगदी औरंगाबाद शहरांत वर्षानुवर्षे वास्तव्यास आसणार्यांनाही याची माहिती नाही.
हे ठिकाण ऐतिहासीक, धार्मिक पौराणिक दृष्ट्या महत्त्वाचे आहेच पण सोबतच निसर्गरम्यही आहे. एरव्ही लांब लांब जावून तिथली वर्णनं एकमेकांना सांगणार्यांना ही जवळची ठिकाणं दिसत नाहीत का? दरवर्षी परदेशी चकरा मारणारे किंवा आम्ही दरवर्षी तिरूपतीला जातो म्हणजे जातोच असे अभिमानाने सांगणारे इतक्या जवळच्या ठिकाणी एखादी चक्कर का मारत नाहीत?
भारतीय माणसांनी आपल्या देशांतच पर्यटन केले पाहिजे हा एक मुद्दा मोदींनी 15 ऑगस्टच्या भाषणांत मांडला होता. इतकी साधी गोष्ट आपण केली तर आपल्या देशांतील पर्यटनाला किती प्रचंड गती येईल. यातून रोजगाराची निर्मिती होईल.
औरंगाबाद परिसरांत व्हिन्सेंट पास्मो हा आमचा फ्रेंच मित्र गेली 4 वर्षे शाश्वत पर्यटनासाठी फिरतो आहे. मनापासून प्रयत्न करतो आहे. त्याच्यासारख्या परदेशी माणसाला या परिसरांतील धार्मिक ऐतिहासिक पुरातत्वीय निसर्गरम्य ठिकाणांचे महत्त्व जाणवते आणि आपण जे इथलेच आहोत त्यांना मात्र अनास्था आहे याची तीव्र खंत वाटते. दु:ख होते.
‘अजिंठा-गौताळा पर्यटन परिक्षेत्र’ या नावाने एक मोठा पर्यटन प्रकल्प या भागांतील मंडळी राबवू पहात आहेत. महाराष्ट्रातील माझ्या पर्यटन प्रेमी मित्रांना विनंती आहे की त्यांनी सहकार्य करावे. केवळ पर्यटन प्रेमीच नव्हे तर इतरही नागरिकांनी आपल्या आपल्या परिने योगदान द्यावे. अजिंठा पाहताना अजून किमान एक दिवस या परिसरांत फिरायचे असा जरी निर्धार प्रत्येकाने केला तरी हा परिसर पर्यटनाच्या दृष्टीने समृद्ध बनण्यास वेळ लागणार नाही. कागदोपत्री औरंगाबादला पर्यटनाची राजधानी म्हणून भागणार नाही. सरकारी योजनांकडे पहात बसून हातावर हात धरून बसून चालणार नाही. प्रत्येकाने या परिसरांत वर्षांतून किमान एक चक्कर मारायची एकढं केलं तरी प्राथमिक पातळीवर पुरेसे आहे.
चला मित्रांनो पाटणादेवी- पितळखोरा-गौताळा अभयारण्य-अंतूर किल्ला-मुर्डेश्वर-जंजाळा किल्ला-घटोत्कच लेणी-वाडीचा किल्ला-रूद्रेश्वर लेणी-अजिंठा-जाळीचा देव-अन्व्याचे प्राचीन मंदिर या परिसरात फेरफटका मारू या... !
(अजिंठा गौताळा टुरिस्ट कॉरिडोर प्रकल्पाचे काम चालू झाले आहे. ज्यांना या कामात सहभागी व्हावयाचे आहे त्यांनी कृपया संपर्क साधावा.)
श्रीकांत उमरीकर, जनशक्ती वाचक चळवळ, औरंगाबाद 9422878575
उकिरड्यावर पडलेले होट्टलचे शिल्पवैभव
उरूस, 22 जानेवारी 2020
नांदेड जिल्ह्यात देगलूर तालूक्यात तेलंगणा सीमेवर होट्टल नावाचे गांव आहे. चालूक्यांची उप राजधानी असलेले हे गांव शिल्पवैभवाने अतिशय समृद्ध आहे. या गावांतील दोन मंदिरांचा जिर्णोद्धार करण्यात आला. आज याच मंदिरांच्या परिसरात होट्टल महोत्सवाचे आयोजन करण्यात येते आहे. एक हजार वर्षांपूर्वीची ही अतिशय समृद्ध अशी नगरी. जूने भक्कम दगडी वाडे आजही गावात आहेत. परिसरांतील 22 गावे ज्यांच्या देशमुखीखाली होती अशा तालेवार देशमुखाची प्रचंड गढी या गावात आहे. गढीची पडझड झालेली असली तरी प्रवेशद्वार आणि त्या भोवतीची भक्कम भिंत जून्या वैभवाची साक्ष देते.
मुख्य महादेव मंदिराचे चिरे, नक्षीदार 20 खांब, बाह्यांगावरच्या सूरसूंदरींची शिल्पे, नृत्य गणेशाचे अप्रतिम शिल्प यांचा शोध घेवून मंदिराचे बांधकाम परत करण्यात आले. स्थानिक पाथरवटांचे सहकार्य घेत रिकाम्या जागी त्याच आकाराचे दगड कलात्मक रित्या बसविण्यात आले. राष्ट्रीय पातळीवर काम करणार्या इनटॅक्ट (इंडियन नॅशनल ट्रस्ट फॉर आर्ट ऍण्ड हेरिटेज) संस्थेच्या सहकार्याने गुरूतागद्दी सोहळ्याच्या निधीतून या कामासाठी काही निधी उपलब्ध करून देण्यात आला.
जिर्णाद्धार झालेली दोन मंदिरे पाहून एकीकडे पुरातन ठेव्याबद्दल अभिमान वाटत असतानाच समोर येते दुसरे भग्न मंदिर. जमिनीखाली अर्धे गाडले गेलेले हे मंदिर आपल्या शिल्पवैभवाने एकीकडे पाहणार्याचे डोळ्याचे पारणे फेडते आणि परिसराची दुर्दशा बघून डोळ्यात पाणीही आणते.
मंदिराच्या परिसरांत कित्येक शिल्पे विखुरलेली आहेत. काही शिल्पांभोवती उकिरडा साठला आहे. प्रातर्विधीसाठी लोक या जागेचा वापर करताना पाहून त्याच दगडांवर डोके आपटून घ्यावे अशी भावना दाटून येते. मंदिर परिसरांत दगडी बांधकाम असलेली बारव आहे. तिथे प्रचंड झाडी गवत वाढले आहे. पाण्याचा उपसा नसल्याने हिरवट शेवाळ्याचा थर साचला आहे. गाळ प्रचंड असल्याने पाण्याला दुर्गंधी येते आहे. निगराणी अभावी दगडी चिरे ढासळून गेले आहेत.
पुरातत्व विभाग काय करतो आहे? किंवा लोकप्रतिनिधी सरकारी अधिकारी काय करत आहेत? या सोबतच आधी सामान्य नागरिक म्हणून आपण या पुरातत्वीय महत्त्वाच्या ठेव्याची अशी अवहेलना का करतो आहोत? हा प्रश्न सतावतो. या मंदिराच्या परिसराची किमान साफसफाई, कुंपण घालून त्याचे संरक्षण इतकी साधी गोष्ट आपणाला का जमत नाही?
एक शिव-हरेश्वराची सुंदर मुर्ती गावात नालीच्या कडेला पडून आहे. हत्तीचे सुंदर शिल्प उकिरड्यावर लोळत आहे. होट्टल महोत्सव पाहण्यासाठी आलेला व्हिन्सेंट पास्किलीनी हा परदेशी फ्रेंच प्रवासी उपहासाने म्हणाला, ‘तूम्ही भारतीय इतके श्रीमंत अहात की अप्रतिम अशी शिल्पे तूम्ही उकिरड्यार फेकून देता.’ आता या उद्गारावर काय प्रतिक्रिया द्यावी?
ज्या मंदिराचा जिर्णोद्धार केला गेला आहे तेथपासून ते जमिनीत गाडल्या गेलेल्या दुसर्या मंदिरापर्यंत सरळ असा दगडी मार्ग असल्याचे अभ्यासक सांगतात. रस्त्यात असलेल्या मानवी वस्तीचे अतिक्रमण काढले तर हा संपूर्ण मार्ग दृष्टीपथास येवू शकतो.
आजही दगडी काम करणारे कारागीर येथे आहेत. त्यांची काम करण्याची तयारी आहे. त्यांचा तो पोटपाण्याचा उद्योग असल्याने गरजही आहे. मग या पाथरवटांच्या साहाय्याने ही कामं आपण का नाही मार्गी लावू शकत? निवेदनं द्या, प्रस्ताव तयार करा, मग सरकारी पातळीवर हालचाली होणार, सरकारी पातळीवरची उदासीनता हे सगळं असह्य आहे. आपल्या लोकप्रतिनिधींना याची जाण जेंव्हा येईल तेंव्हा येईल पण आधी किमान आपण स्थानिक पातळीवर शक्य होईल ते काम केले पाहिजे. त्यासाठी गावकर्यांनी आधी पुढाकार घेतला पाहिजे.
मंदिरांचा जिर्णोद्धार, परिसराची स्वच्छता, होट्टल पर्यंत येण्यासाठी पक्क्या चांगल्या रस्त्याचे निर्माण यातून मोठ्या प्रमाणात स्थानिक रोजगार निर्मिती होईल. केवळ चर्चा करण्यापेक्षा आपण कृती करू या.
होट्टल असो की चारठाणा की मराठवाड्यातील अजून इतरत्र असलेली जूनी मंदिरे आणि प्राचीन वारसा सांगणार्या वास्तू यांचे जतन करण्यासाठी आपण सगळे मिळून चळवळ उभारू या. ज्यांना ज्यांना या कामात सहभागी होण्यात रस आहे, इच्छा आहे, मदत करायची आहे, सुचना आहेत, जे अभ्यासक आहेत त्यांनी संपर्क साधावा. आपण सगळे मिळून मराठवाडा पातळीवर ऐतिहासिक वारसा जतन चळवळीची उभारणी करू या. श्रीकांत उमरीकर 9422878575
शिव किरात - संजय सोनवणी.
अग्नीचा एडका, कुबेराचा मुंगूस, इंद्राचा ऐरावत.... ही वाहनसाखळी ठरवतांना काही लॉजिक असते का मूर्तिशास्त्रात ?
अग्नीचा एडका, कुबेराचा मुंगूस, इंद्राचा ऐरावत.... ही वाहनसाखळी ठरवतांना काही लॉजिक असते का मूर्तिशास्त्रात ?
अर्थातच.
उदा. यज्ञात अग्नीला हवि अर्पण केला जातो. तो मुख्यतः बोकडाशी संबंधित असल्याने एडका हे अग्नीचे वाहन ठरवले गेले. " अजापुत्रम बली दद्यात" हे तर प्रसिद्धच आहे. वायूचे वाहन हरीण हे हरिणाच्या वेगाने धावण्याच्या असलेल्या पद्धतीमुळेच बनवले गेले. ऐरावत हा समुद्रमंथनातून बाहेर पडला आणि इंद्रानेते वाहन म्हणून स्वीकारले. वरुण ही जलदेवता, साहजिकच मगर हे त्याचे वाहन झाले.
येथे एक नमूद करावेसे वाटते, कुबेराचे वाहन हे मुंगूस नव्हे, मुंगूस हे धनाचे प्रतीक असल्याने ते कुबेरासोबत असते. कुबेर हा नरवाहन. तो यक्षांचा अधिपती.
एकंदरीत त्या त्या देवतांच्या स्वभावामुळे किंवा पौराणिक कथेत असलेल्या प्रसंगामुळे त्या त्या देवतांना विशिष्ट वाहने मिळाली आहेत.
कुबेराचे वाहन हे मुंगूस नव्हे, मुंगूस हे धनाचे प्रतीक असल्याने ते कुबेरासोबत असते. कुबेर हा नरवाहन. तो यक्षांचा अधिपती.
वल्ली उर्फ प्रचेतस, कुबेर या विषयावरच अधिक माहिती देणारा धागा काढावा ही विनंती ! तुम्ही दिलेल्या फोटोत धनाची थैली आणि मुंगस मला का दिसत नाही ते कळेना !
धागा नेहमी प्रमाणेच उत्तम आहे ! :)
जाता जाता :- का कोणास ठावूक परंतु लोक दिवाळीत लक्ष्मी पुजनाच्या दिवशी कुबेर पुजन करायचे विसरत चालले आहेत का ? असे वाटते.
या दिवशी गणपती-लक्ष्मी आणि कुबेर यांचे पुजन एकत्रीत करणे महत्वाचे असते.
तुम्ही दिलेल्या फोटोत धनाची थैली आणि मुंगस मला का दिसत नाही ते कळेना !
कुबेराच्या खांद्यावरुन डोक्यावरुन जाणारी एक फुगीर भाग असलेली लांबलचक माळ दिसेल तीच धनाची थैली. ह्याच्या एका टोकाला मुंगुसाचे शिर व दुसर्या टोकाला फुगीर भाग दाखवलेला आहे तीच धनाची थैली.
२४ अवतार म्हणजे २४ रुपांतरे. शंख, चक्र, गदा, पद्म या लक्षणांच्या क्रमानुसार त्यांची विविध नावे ठरतात.
उदा.
केशव- (डावीकडून)पद्म, शंख, चक्र, गदा
नारायण - शपगच
माधव-गचशप
अशी गोविंद, विष्णू, मधूसूदन अशी संध्येतील २४ नावे.
http://www.misalpav.com/node/50494
वैनायकी – गणपतीची शक्ती
१९०९ सालच्या त्या घटनेनंतरची सर्वात महत्त्वाची घटना होती ती १९३१ सालची.
काश्मीरपासून कन्याकुमारीपर्यंत गणपतीसारखीच सोंड असलेली, मात्र स्त्रीरूप असलेली वैनायकी किंवा विनायकीची मूर्ती वा तिच्या प्रतिमा सापडल्या आहेत. मात्र ती नेमकी कोण, पत्नी, शक्ती की मातृका, हा प्रश्न कायम आहे. पुरातत्त्वतज्ज्ञ आणि प्राच्यविद्यातज्ज्ञ शोध घेत असलेल्या या वैनायकीचे गूढ उकलले तर विनायक म्हणजेच गणपती आपल्याला नव्याने आकळेल.
उत्तर प्रदेशातील बांदा जिल्ह्यामध्ये असलेल्या ‘आर्किऑलॉजिकल सव्र्हेऑफ इंडिया’च्या एका गोडाउनमध्ये १९०९ साली प्रतिहार शैलीतील एक मूर्ती सापडली, ही मूर्ती गजाननाची आहे, असे सुरुवातीस वाटले, मात्र नंतर व्यवस्थित पाहिले असता ती मूर्ती सोंड असलेल्या स्त्रीरूपाची आहे, असे संशोधकांच्या लक्षात आले. त्या मूर्तीचा कालखंड शैलीनुसार निश्चित करताना लक्षात आले की, ती १० व्या शतकातील आहे. गणपतीसारखीच सोंडधारी पण स्त्रीरूपिणी म्हणून सुरुवातीस तिचे नामकरण विनायकी किंवा वैनायकी असे करण्यात आले. दरम्यानच्या काळात या वैनायकीचा उल्लेख कुठे प्राचीन धर्मग्रंथांमध्ये सापडतोय का, याचीही चाचपणी पुरातत्त्वतज्ज्ञांनी आणि प्राच्यविद्या संशोधकांनी केली. त्या वेळेस तिचे संदर्भही एक एक करत सापडत गेले. काही पुराणांमध्ये तिचा उल्लेख सापडला तो वैनायकी म्हणून. काही कथांमध्येही तिचा संदर्भ सापडला. तेव्हापासून ते आजपर्यंत पुरातत्त्वतज्ज्ञ आणि प्राच्यविद्यातज्ज्ञ या वैनायकीचे गूढ उकलण्याचा प्रयत्न करत आहेत. मात्र त्यात अद्यापही पूर्ण यश आलेले नाही.
णपतीसारखीच सोंड असलेली मात्र स्त्रीरूप असलेली ही वैनायकी किंवाविनायकी या दोन नावांशिवाय स्त्रीगणेश, गजानन (गजमुख असलेली), विघ्नेश्वरी म्हणूनही शास्त्र-पुराणांमध्ये ती ओळखली जाते. ती नेमकी कोण, हा प्रश्न अद्यापही सुटलेला नाही. काहींच्या मते ती गणेशाची सहचारिणी आहे, काहींच्या मते ती त्याची शक्ती आहे तर काहींच्या मते ती ६४ किंवा ८४ योगिनींपैकी एक आहे, तर काहींच्या मते ती मातृकांपैकी एक असून गणेशाचे आणि तिचे नातेसंबंध हे आई व मुलाचे आहेत. ही एवढी म्हणजेच आई-मुलापासून ते अगदी त्याची शक्ती किंवा सहचारिणी असण्यापर्यंतची त्यांची नाती व्यक्त होण्याची कारणे ही वैनायकीच्या आजवरच्या झालेल्या किंवा करण्यात आलेल्या चित्रणामध्ये दडली आहेत. हे चित्रण कधी तिच्याशी संबंधित कथांमध्ये येते, कधी चित्रांमध्ये पाहायला मिळते तर कधी लेण्यांमध्ये किंवा मंदिरांमध्ये शिल्पित झालेले दिसते. या साऱ्याचा हा अभ्यासात्मक आढावा!
१९०९ सालच्या त्या घटनेनंतरची सर्वात महत्त्वाची घटना होती ती १९३१ सालची. आर. डी. बॅनर्जी यांनी त्यांच्या ‘हैहयाज् ऑफ त्रिपुरी अॅण्ड देअर मॉन्युमेंट्स’ या त्यांच्या पुस्तकामध्ये आणखी एका अशाच सोंडधारी स्त्रीप्रतिमेची म्हणजेच वैनायकीची नोंद केली. हे शिल्प मध्य प्रदेशातील बेडाघाट येथे पाहायला मिळते. त्यानंतर अनेक संशोधकांनी त्यांच्या त्यांच्या परीने घेतलेल्या शोधामध्ये देशभरातील वैनायकींची नोंद होऊ लागली. मग लक्षात आले की, काश्मीरपासून कन्याकुमारीपर्यंत (या दोन्ही ठिकाणी वैनायकी सापडली आहे.) वैनायकीचे अस्तित्व आहे. महाराष्ट्रामध्येदेखील तीन वैनायकी सापडल्या आहेत, त्यातील एक प्रतिमा सध्या राज्यात नाही तर इतर दोन प्रतिमा या मंदिरातील शिल्पांमध्ये कोरलेल्या आहेत. किंबहुना यातील एका शिल्पकृतीमुळे या संदर्भातील संशोधनाला वेगळा आयाम मिळाला आहे.
आजवर भारतीयांनी गणपतीकडे पाहिले ते दैवत म्हणून. त्यामुळेच त्यालाधार्मिक आणि सांस्कृतिक महत्त्व प्राप्त झाले. मात्र गणपती या देवतेचा पुरातत्त्वीय अंगाने शास्त्रीय शोध घेण्याची गरज होती. ही गरज पूर्ण केली ती पॉल मार्टिन दुबोस यांनी. जन्माने फ्रेंच असलेले पॉल भारतीय शिल्पशास्त्र आणि वास्तुरचना यांनी प्रभावित होऊन भारतात आले. त्यावर त्यांनी संशोधनही केले. तेव्हा त्यांच्या असे लक्षात आले की, भारतीयांनीदेखील आजवर गणपतीवर सर्वसमावेशक असे संशोधन केलेले नाही. मग त्यांनीच ते संशोधन करण्याचा ध्यास घेतला. स्वत: संन्यस्त आयुष्य जगत त्यांनी हे संशोधन काम पूर्णही केले. याच संशोधनादरम्यान त्यांना वैनायकीही लक्षात आली. तिचाही शोध त्यांनी सर्वत्र भारतभर फिरून घेतला आणि मग गणपतीवर त्यांनी केलेल्या संशोधनामध्ये त्यांनी एक प्रकरण वैनायकीवरच बेतले. त्यांचा हा संशोधन प्रबंध फ्रँको इंडियाच्या प्रोजेक्ट फॉर इंडियन कल्चरल स्टडीजअंतर्गत फ्रँको इंडियानेच ‘गणेशा-द एन्चॅन्टर ऑफ थ्री वल्र्ड्स’ या नावाने प्रकाशित केला. फ्रेंचमध्ये प्रकाशित झालेला हा मूळ शोधप्रबंध इंग्रजीमध्ये आणण्याचे काम प्रसिद्ध पुरातत्त्वतज्ज्ञ डॉ. किरीट मनकोडी यांनी केले.
पॉल मार्टिन दुबोस यांनी या संशोधनामध्ये भाविकाचा दृष्टिकोन यशस्वीपणेटाळला. त्यामुळे या संशोधनाला शास्त्रीय मूल्य प्राप्त झाले आहे. त्यासाठी ते संस्कृत शिकले, गणेश साहित्य, गणेश प्रतिमा-प्रतीके यांचा सखोल अभ्यास केला. गणेशाचे प्रतिमाशास्त्र, त्यात वेळोवेळी झालेले बदल, भारतीय शिल्पशास्त्राच्या पद्धती-परंपरा आणि गणेशाशी संबंधित सर्व कथा-दंतकथा-रूपके यांचाही अभ्यास केला. त्याच्या शास्त्रीय परिष्करणातून हे संशोधन पुढे आले. वैनायकीचा शोध घेताना पॉल यांना लक्षात आले की, तिच्या इतर प्रचलित नावांबरोबर गणेश्वरी, गणेशनी आणि लम्बोदरी अशीही तिची आणखी तीन नावे आहेत. या साऱ्याचे संदर्भ सापडतात. शिवाय उत्तर भारत आणि मध्य भारतात त्याचप्रमाणे गुजरात, राजस्थान, महाराष्ट्र, बिहार, ओरिसा आणि आसाम या ठिकाणी ती मोठय़ा प्रमाणावर सापडते, पाहायला मिळते.
दक्षिण भारतात राजेंद्र चोला या राजाच्या कालखंडात (११ वे शतक) कोरण्यातआलेल्या शिलालेखांमध्येही तिचा उल्लेख पॉलना आढळला. बंगळुरूजवळ असलेल्या कोलार येथे ‘गणेशनी’ असा तिचा उल्लेख असून ६४ योगिनी आणि मातृकांमध्ये तिचा उल्लेख येतो. तसेच मदुराई आणि सुचिंद्रमच्या मंदिरांमध्ये असलेल्या स्तंभांवरही तिची प्रतिमा शिल्पित झालेली दिसते.
उत्तर कर्नाटकातील शिराळी येथील संग्रहालयामध्ये दोन वैनायकी प्रतिमासंग्रहामध्ये आहेत, त्यातील एक लखनौ येथील तर दुसरी महाराष्ट्रात सापडलेली वैनायकीची ब्राँझमधील प्रतिमा समाविष्ट आहे. (महाराष्ट्रातील प्रतिमा १६ व्या शतकातील आहे) म्युनिच म्युझियममध्ये ही वैनायकीची प्रतिमा असून ती भारतातील केरळमध्ये सापडलेली होती. ही प्रतिमाही १६ व्या शतकातीलच आहे. जशी ही प्रतिमा शिल्पकृतींमध्ये दिसते तशीच ती लघुचित्रांमध्ये किंवा इतर चित्रांमध्येही पाहायला मिळते.
प्राचीन भारतीय साहित्यांमध्येही वैनायकीचा संदर्भ येतो. लिंगपुराण,स्कंदपुराणातील काशीस्कंदामध्ये त्याचप्रमाणे गोरक्षसंहितेमध्येही गजानन किंवा वैनायकीचा संदर्भ येतो. विष्णुधर्मोत्तर पुराणामध्ये तिचा उल्लेख मातृका म्हणून येतो. अंधकासुराच्या वधाच्या वेळेस त्याचे रक्त पडल्यानंतर प्रत्येक थेंबातून होणाऱ्या अंधकासुराच्या नव्या निर्मितीच्या वेळेस युद्धात त्याचा पडलेला प्रत्येक थेंब खाली न पडू देता तो भक्षण करण्यासाठी शिव शंकरांनी मातृकांची निर्मिती केली, त्यात वैनायकी होती असा संदर्भ येतो. मत्स्यपुराणामध्येही हीच कथा देण्यात आली असून त्यात शंकराने निर्मिती केलेल्या २०० देवतांमध्ये ती होती, असे म्हटले आहे. याचा अर्थ तिचा संबंध मातृका असण्याशी आहे. शिव शंकरांची शक्तीरूपिणी म्हणून ती गणपतीची आई असा संदर्भ काही संशोधकांनी लावला आहे. म्हणून अनेक ठिकाणी आपल्याला गणपतीच्या शिल्पकृतींसमोर सप्तमातृका पाहायला मिळतात. महाराष्ट्रात औरंगाबाद लेण्यांमध्ये गणपतीच्या एका बाजूस मातृका तर दुसऱ्या बाजूस बुद्ध शिल्पित करण्यात आले आहेत. तर मुंबईतील जोगेश्वरी लेण्यांमध्येही गणपतीच्या शिल्पाच्या बरोबर समोरच्या बाजूस सप्तमातृका कोरलेल्या असून त्या शिल्पकृतीची बरीचशी झीज झाली आहे. मात्र त्या सप्तमातृका आहेत, हे पुरते लक्षात येते.

वैनायकीची शिल्पे ही बसलेली, उभी किंवा नृत्यावस्थेतील आहेत. तिला दोन किंवा चार हात दाखविलेले आहेत. दगडामध्ये कोरलेल्या अनेक प्रतिमांची झीज झालेली आहे किंवा मग त्या तुटलेल्या तरी आहेत त्यामुळे तिची अस्त्र-शस्त्रे यांची नेमकी माहिती हाती नाही. पण काही प्रतिमांमध्ये लक्षात आलेल्या अस्त्रांमध्ये परशू, वज्र, साप, तुटलेला हत्तीचा दात (एकदंताशी नाते सांगणारा), मोदकपात्र किंवा वीणा यांचा समावेश आहे. शिवाय अभय किंवा वरद म्हणजे रक्षण करणारी किंवा वर देणारी या मुद्राही तिच्या हातांमध्ये पाहायला मिळतात. या मुद्रांवरून तिचे देवत्व पुरते सिद्ध होते. रिखिआन (१० वे शतक), बेडाघाट (११ वे शतक), हिरपूर, झारिआल (ओरिसा- १० वे शतक) या सर्व ठिकाणी ती मातृका म्हणून किंवा ६४ योगिनींपैकी एक म्हणून येते. प्रसिद्ध अभ्यासक देवांगना देसाई यांनीही त्यांच्या संशोधन प्रबंधामध्ये तिचा उल्लेख योगिनी म्हणूनच केला आहे.
चिदम्बरम आणि मदुराईतील मूर्तीमध्ये ती व्याघ्रपाद म्हणजे वाघाचे पायअसलेली अशी दाखविण्यात आली आहे. जे. ए. बॅनर्जी यांनी त्यांच्या शोधप्रबंधामध्ये तिचा उल्लेख गणेशाची स्त्रीरूपिणी किंवा रिद्धी, सिद्धी, बुद्धी, पुष्टी, भारती किंवा नीला सरस्वतीप्रमाणेच त्याची सहचारिणी म्हणून केला आहे. मात्र यातील एक महत्त्वाचा फरक इथे लक्षात घ्यायलाच हवा तो म्हणजे वैनायकी वगळता सर्व सहचारिणी या मानवी स्त्रीरूपातच शिल्पित किंवा चित्रित झाल्या आहेत. रिखिआन येथील वैनायकीचे ९ व्या शतकातील शिल्प हे सर्वात जुने शिल्प मानले जाते.
वैनायकी ही गणेशाची शक्तीरूपिणी स्त्री असण्याची शक्यता असल्याचे दोनच संदर्भ संपूर्ण भारतात सापडतात. त्यातील एक संदर्भ हा उदयपूरच्या उदयेश्वर मंदिराच्या गर्भगृहामध्ये आहे. तर दुसरा संदर्भ म्हणजेच शिल्प १२ ज्योतिर्लिगांपैकी एक असलेल्या महाराष्ट्रातील औंढय़ा नागनाथ मंदिरावर आहे. या दोन्ही ठिकाणी गणपती वैनायकीसोबत पाहायला मिळतो. त्यातही औंढय़ा नागनाथचे शिल्प सर्वाधिक महत्त्वाचे आहे. कारण हे जगातील एकमेव शिल्प आहे, ज्यात गणपती, सिद्धी, बुद्धी आणि वैनायकीच्या सोबत दिसतो.
मात्र देवतेची शक्ती म्हणजे त्याची पत्नी नाही हे समीकरणही इथे लक्षात घ्यावे लागते. शक्ती म्हणजे ऊर्जा. अगदी अश्मयुगापासून माणसाला स्त्रीमधील प्रसवण्याची शक्ती म्हणजे ऊर्जा असे वाटत आहे. ती शक्ती आहे, असे माणसाने मानले. म्हणूनच जगभरात सर्वत्र देवतेच्या सापडलेल्या पहिल्या प्रतिमा या लज्जागौरीच्या म्हणजेच मातृकेच्या पायविलग अवस्थेतील तिचे जननेंद्रिय स्पष्टपणे दाखविणाऱ्या अशा आहेत. किंबहुना म्हणून कोणत्याही देवतेची शक्ती किंवा ऊर्जा दाखविताना ती स्त्रीरूपातच दाखविली जाते. मात्र याचा अर्थ ती त्याची पत्नी असा होत नाही. किंबहुना म्हणूनच वैनायकीबाबतचे हे गूढ अद्याप उकललेले नाही. ती नेमकी कोण, पत्नी, ऊर्जा म्हणजेच शक्ती की मातृका हा प्रश्न अद्याप कायम आहे. हे गूढ उकलेले त्या वेळेस विनायक म्हणजेच गणपती आपल्याला नव्याने आकळेल असे संशोधकांना वाटते आहे. यंदाच्या गणेशोत्सवाच्या निमित्ताने गणेशाशी संबंधित हे स्त्रीरूप समजून घेणे सयुक्तिक ठरावे.
संदर्भ – गणेशा-द एन्चॅन्टर ऑफ थ्री वर्ल्ड्स- पॉल मार्टिन दुबोस, अनुवाद- डॉ. किरीट मनकोडी आणि पुरातत्त्वतज्ज्ञ व प्रतिमाशास्त्रातील जाणकार डॉ. किरीट मनकोडी यांच्याशी वेळोवेळी झालेला संवाद.
विनायक परब – vinayak.parab@expressindia.com
प्राचीन मंदिरांच्या बाह्य भिंतींवर, प्रवेशद्वारांवर, तसेच सभामंडपामध्ये, अंतराळात आपणास अनेक मूर्ती कोरलेल्या दिसतात - शिव, विष्णू, देवी आदी देवता, सुरसुंदरी, नर्तक, वादक ह्याशिवाय सर्वसाधारणपणे हटकून दिसतात त्या लोकपालांच्या अर्थात दिक्पालांच्या मूर्ती. हे दिक्पाल त्या त्या विशिष्ट दिशांचे आणि उपदिशांचे पालन करतात, असे मानले जाते. इंद्र, अग्नी, वायू, यम, कुबेर, वरुण, ईशान आणि निर्ऋती ह्या त्या दिशांच्या देवता. मुख्य दिशांच्या देवतांची नावे वेगळी, मात्र उपदिशा आणि त्यांच्या देवता यांची नावे एकमेकांना समांतर असलेलीच आढळून येतात. उदा. आग्नेयेचा दिक्पाल अग्नी, नैर्ऋत्येचा निर्ऋती, ईशान्येचा ईशान आणि वायव्येचा वायू. ही उपदिशांची नावे त्या त्या देवतेपासूनच पडलेली आहेत, हे उघड आहे. इंद्र, अग्नी, वायू, यम, वरुण आणि ईशान ह्या वैदिक देवता आहेत, कुबेर हा यक्षांचा अधिपती, तर निर्ऋती हा चक्क राक्षस आहे. अगदी क्वचित ह्या दिक्पालांच्या मूर्ती त्यांच्या शक्तीसहदेखील आढळतात. दिक्पाल मूर्ती ओळखणे तसे सोपे आहे. त्यांची वाहने आणि हातातील आयुधे यावरून ते सहज जाणून घेता येते. चला तर मग, आता एकेक दिक्पालाची विस्ताराने माहिती घेऊ.
इंद्र (पूर्व दिशेचा अधिपती)
हा देवतांचा राजा. ऐरावत हत्ती हे त्याचे वाहन. वेदांतील सर्वाधिक प्रसिद्ध देवता म्हणजे इंद्रच. इंद्राची पूजा पूर्वी इंद्रध्वजाच्या रूपाने जनमानसात प्रचलित असे. ह्या इंद्रध्वजाच्या पूजेचे वर्णन माझ्या 'गुढीपाडवा - शक्रोत्सवातील इंद्रध्वजपूजेचे प्राचीन साहित्यातील वर्णन' ह्या लेखात विस्ताराने दिलेले आहे. इंद्राची पत्नी शची. काही ठिकाणी इंद्र शचीसह दिसतो. इंद्राची मूर्ती ओळखणे अगदी सोपे. हत्तीवर स्वार किंवा पायाशी हत्ती अशा पद्धतीने इंद्र दाखवला जातो. हातातील आयुधे म्हणजे वज्र, अंकुश.
कायगाव टोके मंदिरात असलेली इंंद्राची मूर्ती - हातात अंकुश, गदा, अक्षमाला आणि कमंडलू आहेत, तर वाहन हत्ती हे पायाशी आहे.
वेरुळ येथील धुमार लेणीत शिल्पपटात असलेली इंद्राची मूर्ती
खिद्रापूरच्या कोपेश्वर मंदिरातली हत्तीवर स्वार इंद्राची मूर्ती, हाती वज्र आणि अंकुश आहेत.
पेडगाव येथील लक्ष्मीनारायण मंदिरातील इंद्राची मूर्ती
अग्नी (आग्नेयेचा अधिपती)
वैदिक देवतांत इंद्रानंतर कोणाचे स्थान असेल तर ते अग्नीचे. यज्ञाच्या माध्यमातून देवांना हवी पोहोचवण्याचे काम करणारा तो अग्नी. अग्नीची मूर्ती ओळखायची सर्वात सोपी खूण म्हणजे त्याचे वाहन एडका. यज्ञात अजापुत्राला अर्थात बोकडाला यज्ञपशू म्हणून महत्त्वाचे स्थान असल्याने अग्नीचे ते वाहन असल्यास नवल नाही. अग्नीच्या इतर लक्षणांमध्ये त्याची आयुधे म्हणजे ध्वज, कमंडलू, अ़क्षमाला, शक्ती. आयुधात बर्याच वेळा पोथी, गदा, स्रुक, स्रुवा अशी भिन्नताही आढळते.
कायगाव टोके येथील अग्नीचे शिल्प
खिद्रापूरच्या कोपेश्वर मंदिरावरील बाह्य भिंतीवर असलेली एडक्यावर स्वार अग्नी मूर्ती
पेडगावच्या लक्ष्मीनारायण मंदिराच्या बाह्य भिंतीवरील अग्नी शिल्प
वेरुळच्या प्रवेशद्वारावर कोरलेली अग्नी मूर्ती
ह्याशिवाय पाटेश्वर येथील लेणीत अग्नीची एक वेगळीच प्रतिमा बघायला मिळते.
ऋग्वेदातील चौथ्या मंडलातील ५८व्या सूक्तातील तिसर्या श्लोकात अग्नीचे वर्णन पुढील प्रकारे आले आहे -
चत्वारि शर्ङगा तरयो अस्य पादा दवे शीर्षे सप्त हस्तासो अस्य |
तरिधा बद्धो वर्षभो रोरवीति महो देवो मर्त्यां आ विवेश ||
अग्नी हा ४ शिंगे, ३ पाय, २ मस्तके, ७ हस्त आणि ३ ठिकाणी बांधलेला एक वृषभच आहे.
चार शिंगे म्हणजे चार वेद, ३ पाय म्हणजे दक्षिण, गार्हपत्य आणि आहवनीय हे तीन प्रकारचे अग्नी, २ मस्तके म्हणजे एक मानवाचे (हवन करणार्या ऋषीचे) आणि दुसरे वृषभाचे (हे बांधलेल्या यज्ञपशूचे प्रतीक), ७ हस्त म्हणजे काली, कराली इत्यादी सात प्रकारच्या ज्वाला. असा हा अग्निवृष.
पाटेश्वर येथील अग्निवृष
अग्निवृष
वरुण (पश्चिम दिशेचा अधिपती)
वरुण ही जलदेवता. पश्चिमेकडील बाजूस समुद्र असल्याने साहजिकच हा पश्चिमेचा अधिपती झाला. पाश हे वरुणाचे प्रमुख आयुध आणि जलदेवता असल्याने मकर हे त्याचे वाहन झाले. जलदेवता असल्याने काही वेळा एका हातात तर काही वेळा दोन्ही हातात कमळे आढळतात. समुद्रच नव्हे, तर सरोवरे, नद्या जिथे जिथे जल असेल त्यांचा स्वामी वरुण बनला.
कायगाव टोके येथील वरुणाची मूर्ती
पेडगाव येथील वरुणाची मूर्ती, मकर हे वाहन पायापाशी दिसेल.
वेरुळ येथील कैलास लेणीतील वरुणाची मूर्ती
खिद्रापूरच्या कोपेश्वर मंदिरातील मकरारूढ वरुण
वायू (वायव्येचा अधिपती)
वैदिक ग्रंथांत वायूस महत्त्वाचे स्थान नाही, मात्र महाभारत, रामायण हा महाकाव्यांत अनुक्रमे भीम आणि हनुमान यांचा जनक म्हणून मानाचे स्थान आहे, तर वायूच्या आराधनेसाठी वायुपुराणही निर्मिले गेले. वायूच्या मूर्तीच्या निर्मितीत त्याच्या अंगभूत लक्षणांचा पुरेपूर वापर केला गेल्याचे आपणास दिसते. वायूच्या दोन्ही हातात फडफडत्या पताका/ध्वज दिसतात, वायूचे वस्त्रदेखील फडफडताना दिसते, वायुमूर्ती ओळखण्याचे सर्वात महत्त्वाचे लक्षण म्हणजे त्याचे वाहन हरीण. वेगाने धावत असल्याने हरीण हेच वायूचे वाहन बनल्यास त्यात काहीच नवल नाही.
कायगाव टोके येथील दोन्ही हातांत फडफडत्या पताका, कमंडलू, अक्षमाला आणि वाहन हरीण यांनी युक्त अशी वायुमूर्ती
पेडगावच्या लक्ष्मीनारायण मंदिरातील बाह्य भिंतीवरील वायुमूर्ती
वेरुळ लेण्यातील वायुमूर्ती
यम (दक्षिण दिशेचा अधिपती)
यम ही वैदिक देवता. सूर्याचा पुत्र. मृतांना स्वर्गास अथवा नरकास पोहोचवणारा हा देव. मृतांना नेण्यास हा आपल्या दूतांना पाठवतो. दक्षिण दिशा मृतांची मानली गेली आहे, साहजिकच यमाकडे दक्षिणेचे आधिपत्य आले किंवा यमाकडे दक्षिण दिशेचे आधिपत्य आहे, म्हणूनही दक्षिण दिशेस मृतांची दिशा मानले गेले असावे. ऋग्वेदातील १० मंडलातील यम-यमी संवाद हे संवादसूक्त अतिशय प्रसिद्ध आहे. तर महाभारतात पतिव्रतोपाख्यानात सत्यवान-सावित्री आणि यम यांची कथा विस्ताराने आली आहे. मार्कंडेयास नेण्यास आलेल्या यमाचे पारिपत्य करणार्या शिवाची कथा तर प्रसिद्धच आहे. कालारी शिव अर्थात मार्कंडेयानुग्रह मूर्तीत शिव आणि यमाचे शिल्पांकन केलेले आढळते. यम हा काळाचे/मृत्यूचे प्रतीक, साहजिकच त्याचे वाहन रेडा हेच आहे. इतर लक्षणांत पाश, दंड, खड्ग, अक्षमाला/कमंडलू ही आयुधे अंतर्भूत आहेत.
कायगाव टोके येथील यमाची प्रतिमा - हाती दंड, यमपाश, अक्षमाला आणि पापपुण्याची नोंदवही आहे.
खिद्रापूरच्या कोपेश्वर मंदिराच्या स्वर्गमंडपातील यमाचे शिल्प
कैलास लेणे, वेरुळ येथील यमाचे शिल्प
कुबेर (उत्तर दिशेचा अधिपती)
कुबेर हा विश्रव्याचा पुत्र असल्याने याला वैश्रवण असेही म्हणतात. हा यक्षांचा अधिपती. साहजिकच यक्षांप्रमाणेच ह्याचे शरीरही स्थूल दाखवले जाते. 'कुसित बेरं शरीरं यस्य सः' - अर्थात ज्याचे शरीर कुरूप, बेढब असा तो कुबेर. अर्थात कुबेराच्या सर्वच मूर्ती स्थूल आहेत असेही नाही. त्याच्या मूर्ती सडपातळही आहेत. कुबेर हा जैन आणि बौद्धांमध्येही आढळतो. बौद्धांमध्ये तो जंभाल होतो. त्याची पत्नी भद्रा ही बौद्धांमध्ये हरिती होते.
कुबेराची मूर्ती ओळखणे तसे अवघड, कारण कुबेराची लक्षणे एकसारखी नाहीत. त्याचे प्रमुख वाहन नर. स्थूल असल्याने पालखीद्वारे हा उचलला जात असल्याने कुबेराला नरवाहन म्हणतात. काही वेळा कुबेराचे वाहन हत्ती किंवा घोडा हेसुद्धा दाखवल्याचे दिसते. मात्र कुबेर ओळखण्याचे एक हमखास लक्षण म्हणजे त्याच्या हाती असलेली धनाची पिशवी आणि मुंगूस. कुबेर हा देवांचा धनाध्यक्ष. साहजिकच त्याच्या हाती धनाची पिशवी असते, तर मुंगूस हेसुद्धा धनाचे प्रतीक. मुंगूस दिसल्यावर धनलाभ होतो असे आजही मानतात. मात्र मुंगूस हे कुबेराचे वाहन नव्हे.
कायगाव टोके येथील कुबेर प्रतिमा. येथे वाहन हे हत्ती असून हाती धनाची पिशवी घेतलेली आहे.
खिद्रापूरच्या कोपेश्वर मंदिरातील घोड्यावर बसलेल्या कुबेराची प्रतिमा
पेडगाव येथील मुंगूस आणि धनाची पिशवी हाती घेतलेला कुबेर
वेरुळ येथील क्र. २०च्या लेणीतील तुंदिलतनू असलेला कुबेर
वेरुळ येथील बौद्ध लेणीतील जंभाल आणि हरितीची प्रतिमा
निर्ऋती (नैर्ऋत्येचा अधिपती)
निर्ऋतीचे नाव ऋग्वेदात आढळते, मात्र त्याबद्दल अधिक माहिती मिळत नाही. वेदात हा राक्षस म्हणूनच ह्याचा उल्लेख येतो. काही पुराणे निर्ऋतीला स्त्रीरूपी मानतात आणि अलक्ष्मी म्हणूनही निर्ऋतीचे नाव येते. वेदोक्त देवतांच्या रूपांमध्ये विविध कथापुराणांद्वारे हळूहळू बदल होत जाताना निर्ऋतीला दिशाधिपतीचे काम आले असावे, असे म्हणता येते. निर्ऋतीच्या मूर्तीही तुलनेने मोजक्याच आढळतात, ज्या मंदिरांमध्ये दिक्पाल मूर्ती आहेत, तिथेही काही वेळा निर्ऋतीची मूर्ती नसते. मात्र निर्ऋतीची मूर्ती जिथे असेल तिथे ती ओळखणे मात्र सोपे आहे. निर्ऋती हा प्रेतवाहन किंवा नरवाहन. हाती खड्ग, खेटक, नरमुंड ही सर्वसाधारण लक्षणे आणि चेहरा उग्र, दाढा विचकलेल्या असे रूप.
कायगाव टोके येथील निर्ऋतीची मूर्ती. हाती खड्ग, खेटक (ढाल), नरमुंड आणि एक हात अभयमुद्रेत आहे.
खिद्रापूरच्या कोपेश्वर मंदिरातील नरवाहन निर्ऋतीची मूर्ती
खिद्रापूरच्याच कोपेश्वर मंदिरातील प्रेतवाहन निर्ऋतीची मूर्ती
ईशान (ईशान्येचा अधिपती)
ईशान हे शिवाचेच एक रूप आहे, त्यामुळे ह्याच्या मूर्तीची लक्षणे जवळपास सर्वच शिव आणि भैरवासारखीच आहेत. हाती डमरू, कमंडलू, त्रिशूळ, नाग. याचे वाहन बैल. भैरवमूर्ती आणि ईशान यांच्यामधील फरक म्हणजे भैरव रौद्र आणि काही वेळा नग्न असतो आणि भूतगण, नरमुंडही बाजूला असतो, तर ईशान मूर्ती सौम्य असते.
कायगाव टोके येथील ईशान मूर्ती
पेडगाव येथील ईशान मूर्ती
पिंपरी दुमाला येथील सोमेश्वर मंदिरातील ईशान मूर्ती
मातृका
ब्राह्मी माहेश्वरी चैव कौमारी वैष्णवी तथा |
वाराही च तथेन्द्राणी चामुण्डा सप्तमातरः ||
ब्रह्मा, शिव, स्कंद, विष्णू, इंद्र आदी देवतांच्या अंशापासून मातृका उत्पन्न झाल्या, असे विविध पुराणांमध्ये उल्लेख आहेत, तर अंधकासुरवध कथेत शिवाने मारलेल्या अंधकासुराच्या रक्तापासून नवीन असुर उत्पन्न होऊ नयेत म्हणून त्यांचे रक्त पिण्यासाठी योगेश्वरी आणि इतर मातृका उत्पन्न केल्या, असा उल्लेख आहे. वर श्लोकात उल्लेख केल्याप्रमाणे ब्राह्मी, माहेश्वरी, कौमारी, वैष्णवी, वाराही, इंद्राणी, चामुंडा ह्या सप्तमातृकांसह कधीकधी आठवी मातृका नारसिंहीसुद्धा दिसते. मातृका ह्या शाक्त अथवा तंत्र पंथामधील समजल्या जातात. ह्या मातृकांचे शिल्पांकन सर्वसाधारणपणे वेगवेगळे आढळत नाही, त्या पट स्वरूपातच आपल्याला दिसतात. सप्तमातृकापटात नेहमी मातृकांच्या एका बाजूला वीरभद्र आणि दुसर्या बाजूला गणेश आढळतो. ह्या दोघांच्या मध्ये सात मातृका आपल्या बाळांसह दिसतात. तर प्रत्येक मातृकेच्या खालील बाजूस त्यांची वाहने कोरलेली असतात. क्वचित प्रसंगी मातृकांची वेगवेगळी शिल्पेदेखील दिसतात. चामुंडा मात्र जवळपास सर्वत्रच स्वतंत्र कोरलेली आढळते.
मातॄकांची वाहने पुढीलप्रमाणे
ब्राह्मी - हंस
माहेश्वरी - बैल
कौमारी - मोर
वैष्णवी - गरुड
वाराही- वराह, घुबड
इंद्राणी - हत्ती
चामुंडा- प्रेत
आता काही सप्तमातृकापट पाहू या.
वेरुळ येथील कैलास लेणीतील सप्तमातृकापट
कैलास लेणीतील यज्ञशाळेतील समोरील बाजूस कोरलेला आहे हा प्रचंड सप्तमातृकापट. या सप्तमातृकांची पूजा नेहमी यज्ञाच्या वेळी केली जायची. वाराही, ऐंद्री, वामनी (ब्राह्मणी), नारसिंही या वैदिक अंश असलेल्या तर माहेश्वरी, कौमारी आणि चामुंडा या अनार्य अंश असलेल्या सप्तमातृका. यातील प्रत्येक मातेच्या हाती अथवा मांडीवर त्यांची बाळे आहेत. ह्या देवता म्हणजे जननशक्तीचे जणू एक प्रतीकच. अतिशय देखण्या आणि सालंकृत असलेल्या ह्या मूर्ती आज भग्नावस्थेत आहेत. मूर्तिभंजकांनी मातृकांची मस्तके जरी नष्ट केली असली, तरी प्रत्येक मूर्तीच्या खाली तिचे वाहन कोरलेले आहे, त्यावरून ह्या मातृका सहज ओळखू येतात. येथील एक वाहनांतील बदल म्हणजे वाराहीचे वाहन महिष असून चामुंडेचे शृगाल आहे.
वेरुळ येथील लेणी क्रमांक १४ येथील सप्तमातृकापट (येथे चामुंडेचे वाहन घुबड हे आहे)
वेरुळ येथील कैलास लेणीच्या डावीकडील लहानशा लेणीतील उभ्या स्थितीत असलेल्या सप्तमातृकांचा पट
टाकळी ढोकेश्वर येथील सप्तमातृकापट
लेणीतील प्रवेशद्वारातून आत जाताच डावीकडे एक भव्य सप्तमातृकापट आहे.
वीरभद्र (नंदी), ब्राह्मणी (स्त्री), माहेश्वरी (नंदी), कौमारी (मोर),
वैष्णवी (गरुड), वाराही (वराह), ऐंद्राणी (हत्ती), चामुंडा (कुत्रा) आणि
शेवटी मोदकपात्रासह गणेश असा हा शिल्पपट.
ब्राह्मणीचे वाहन नेहमी हंस असते, इथे मात्र ते स्त्रीरूपात दाखवलेले आहे.
प्रत्येक मातृकेच्या हाती अथवा मांडीवर त्यांची बाळे आहेत. वाराही ही
वराहमुखी दाखवली असून चामुंडा तिच्या नेहमीच्या भयप्रद रूपात आहे.
ह्याशिवाय खिद्रापूरच्या कोपेश्वर मंदिरातदेखील दोन सप्तमातृकापट आहेत.
आता मातृकांची काही एकल रूपातील शिल्पे पाहू या. (सर्व शिल्पे कायगाव टोके मंदिरातील)
माहेश्वरी - डमरू, खड्ग, नाग, वाहन- बैल
कौमारी -कमंडलू, पुस्तक, बीजापूरक आणि पंखा, वाहन - मोर
वैष्णवी - शंख, चक्र, कमळ, वाहन - गरुड
ऐंद्राणी - पाश, अंकुश, वाहन - हत्ती
वराहमुखी वाराही - वाहन - महिष
याशिवाय चामुंडेची स्वतंत्र शिल्पे तर पुष्कळ दिसतात, चामुंडा ओळखणे तर अगदी सोपे. मातृकापटांतील चामुंडेचे वाहन प्रेत, शृगाल, घुबड अशा भिन्न रूपांत दाखवलेले असले, तरी एकल चामुंडा मूर्तीत प्रेत हे वाहन असते. चामुंडेच्या पोटात विंचू असतो, जो तिच्या भुकेचे प्रतीक आहे. हातपायांचा अस्थिपंजर असून स्तन लोंबते असतात. रूप कराल असून दाढा विचकलेल्या असतात. भयप्रद स्वरूपाची चामुंडा बर्याच वेळा शीळ घालण्यार्या मुद्रेत असलेल्या दिसून येते.
खिद्रापूरच्या कोपेश्वर मंदिरातील चामुंडा
पिंपरी दुमाला येथील चामुंडा मूर्ती
सर्वात शेवटी भुलेश्वर येथील सर्वांगसुंदर चामुंडा पाहू.
अष्टदिक्पाल आणि मातृका आपण वरील लेखात विस्ताराने पाहिले. आणखीही माहिती देता आली असती, मात्र ती तांत्रिक आणि किचकट झाली असती - उदा., पुराणांत वर्णन केल्याप्रमाणे असलेले त्यांचे रंग, त्यांच्या वाहनांचे विस्तारपूर्वक वर्णन, शिल्पशास्त्रात असलेली त्यांची संस्कृत वर्णने. येथे मी त्यांची सर्वसाधारण माहिती येथील मंदिरांच्या अनुषंगाने आणि ह्या मूर्ती सहजी ओळखता येईल अशा प्रकारे मांडली. काही शिल्पे भग्न झाल्यामुळे त्यात कदाचित काही त्रुटी असण्याचा संभव आहे - उदाहरणार्थ, खिद्रापूर मंदिरातील निर्ऋती आणि कुबेर यांच्या मूर्तीत गल्लत झाली असण्याचा संभव आहे. घोडा असलेली मूर्ती कदाचित कल्कीची असू शकते आणि नरवाहन असलेला निर्ऋती हा कदाचित कुबेर असू शकतो. मूर्ती उंचावर असल्याने आणि छायाचित्रातील लक्षणे पुरेशी स्पष्ट दिसत नसल्याने ही चूक होऊ शकते. इतर स्रोतातून अधिक माहिती मिळाल्यास स्वागतच आहे.
धन्यवाद.आग्नेय आशियातील विष्णुमूर्ती...
- आनंद कानिटकर kanitkaranand@gmail.com
आग्नेय आशियामध्ये शंकरासोबतच विष्णूची उपासना किमान दीड हजार वर्षांपूर्वी सुरू झाली होती, हे तेथील शिलालेख आणि मूर्तींच्या पुराव्यांवरून लक्षात येते. त्यातील काही मोजक्या आणि महत्त्वाच्या मूर्तींची ओळख आजच्या लेखात करून घेणार आहोत.
आपल्या देशात उत्तर प्रदेश, मध्य प्रदेशात कुशाण राजवंशाच्या काळातील (आजपासून सतराशे वर्षांपूर्वीच्या) विष्णुमूर्ती आढळलेल्या आहेत. त्यानंतर आलेल्या गुप्त राजवंशाच्या काळातील (आजपासून सोळाशे वर्षांपूर्वीच्या) विष्णुमूर्ती मध्य प्रदेशातील उदयगिरी लेण्यांत किंवा मथुरा इथे सापडल्या आहेत. या आपल्या देशातल्या प्राचीन विष्णुमूर्ती आहेत. याच काळात शैव आणि वैष्णव पंथ आताच्या भारताच्या भौगोलिक सीमा ओलांडून आग्नेय आशियातील थायलंड, कंबोडिया, इंडोनेशिया, व्हिएतनाम इत्यादी देशांमध्ये पोहोचले. भूतलावरील राजा हा सृष्टीचे पालनपोषण करणाऱ्या विष्णुसमान किंवा विष्णूचा अवतार आहे ही भारतीय संकल्पनासुद्धा आग्नेय आशियातील या देशांमध्ये दिसून येते.
थायलंड : आग्नेय आशियात सापडणाऱ्या सर्वांत प्राचीन विष्णुमूर्तींपैकी एक विष्णुमूर्ती आपल्याला थायलंडमध्ये सापडते. दक्षिण थायलंडमधील चैय्या इथे सापडलेली ही विष्णुमूर्ती भारतातील कुशाण आणि गुप्त राजवंशाच्या काळातील मूर्तींशी साम्य दाखवणारी आहे. इसवीसन चौथ्या/पाचव्या शतकात म्हणजे आजपासून सोळाशे ते पंधराशे वर्षांपूर्वी ही मूर्ती तयार करण्यात आली होती.
ही मूर्ती चतुर्भुज विष्णूची आहे. या मूर्तीत विष्णूच्या मस्तकावर किरीट असून कानात मोठी कुंडलं आहेत. मूर्तीचा मागील डावा हात तुटलेला असून मागील उजव्या हाताने गदा धरलेली आहे. पुढील उजवा हात अभय मुद्रेत असून पुढील डाव्या हातात शंख धरलेला आहे. अशा पद्धतीने कमरेपाशी शंख धरलेल्या भारतातील कुशाण राजवंशाच्या आणि गुप्त राजवंशाच्या काळातील विष्णुमूर्ती उत्तर भारतात आढळून आलेल्या आहेत.
काही अभ्यासकांच्या मतानुसार चैया येथील ही विष्णुमूर्ती म्हणजे आग्नेय आशियातील आता उपलब्ध असलेली सर्वांत प्राचीन विष्णूमूर्ती आहे. इसवीसनाचे चौथे शतक किंवा पाचवे शतक या दरम्यानच्या कोणत्या काळात ही मूर्ती घडवण्यात आली असावी, याबद्दल अभ्यासकांत मतमतांतरे आहेत. काही असले तरी भारतातील विष्णुमूर्तीचा प्रचंड प्रभाव असणारी ही आग्नेय आशियातील महत्त्वाची मूर्ती आहे, हे नक्की. याशिवाय थायलंडमध्ये इतरही अनेक ठिकाणी विष्णूमूर्ती सापडल्या आहेत. थायलंडमधील प्राचीन आणि मध्ययुगीन काळातील तेथील शैव आणि वैष्णव पंथांचा प्रभाव तेथील हिंदू मंदिरे आणि देवतांच्या मूर्तींवरून लक्षात येतो.
कंबोडिया : कंबोडियातील सोळाशे वर्षांपूर्वीच्या शिलालेखांतूनसुद्धा विष्णुमंदिरांना दिलेली दानं नमूद केलेली आहेत. त्या काळातील काही विष्णुमूर्तीदेखील सापडल्या आहेत. मात्र विष्णुभक्तीचा कळस आपल्याला अंकोरवाट नावाने प्रसिद्ध असणाऱ्या मंदिरात बघायला मिळतो. हे मंदिर कंबोडियातील सूर्यवर्मन (दुसरा) या राजाने बाराव्या शतकात बांधलं. तेथील शिलालेखांत या राजाचे नाव परमविष्णुलोक असे नोंदलेले आहे. या मंदिरातील समुद्रमंथनाचे शिल्प अत्यंत प्रसिद्ध आहे. समुद्रमंथनाच्या या शिल्पात कुर्मावतारासह विष्णूची मूर्तीदेखील पहायला मिळते.
या मंदिराशिवाय अंकोरच्या परिसरात थोम्मानन, बांते सम्रे इत्यादी विष्णुमंदिरं आढळून येतात. या सर्व मंदिरांवरील शिल्पांमध्ये आपल्याला विष्णू, राम, कृष्ण यांच्या मूर्ती आणि त्यांच्याशी संबंधित कथांची शिल्पं कोरलेली आढळतात. कंबोडियामध्ये विष्णूच्या दगडी शिल्पांखेरीज ब्राँझच्या मूर्तीदेखील सापडल्या आहेत. यातील आठशे वर्षांपूर्वीची गरुडारूढ विष्णूची एक मूर्ती वैशिष्ट्यपूर्ण आहे. कंबोडियातील अनेक मंदिरांच्या भिंतीवर आढळणाऱ्या गरुडारूढ विष्णूच्या दगडी मूर्तींसमान ही ब्राँझची मूर्ती घडवलेली आहे.
व्हिएतनाम : मध्य आणि दक्षिण कंबोडियातील वैष्णव पंथाचा प्रभाव व्हिएतनाममध्येदेखील पडला होता. त्यामुळे व्हिएतनाममध्येदेखील इसवी सनाच्या पाचव्या शतकापासून विष्णुमूर्ती निर्माण केल्या जात होत्या. येथील एका विष्णुमूर्तीच्या वरील दोन हातांत शंख आणि चक्र दिसून येते. तर खालील डावा हात हा गदेवर ठेवलेला आहे. या मूर्तीत विष्णूचे कुरळे केस दाखवले असून मस्तकावर किरीट आहे.
ही विष्णुमूर्ती साधारणपणे तेराशे वर्षांपूर्वीची आहे. या मूर्तीच्या अंगावर कोणतेही दागिने कोरलेले नाहीत. त्या काळी कंबोडिया, व्हिएतनाम येथील मूर्तींना कानातील, गळ्यातील सोन्याचे दागिने घातले जात असत, हे तेव्हाच्या शिलालेखांवरून समजते. व्हिएतनाममधील या मूर्ती अत्यंत प्रमाणबद्ध आणि सुरेख पद्धतीने घडवलेल्या आहेत. व्हिएतनाममधील मी सन या प्राचीन शैव तीर्थक्षेत्राच्या ठिकाणी शेषशायी विष्णूची मूर्तीदेखील सापडली होती, याबद्दल आपण व्हिएतनामवरील एका लेखात बघितले आहे.
इंडोनेशिया : इंडोनेशियातील प्राचीन हिंदू मूर्तींमध्ये काही विष्णुमूर्तीदेखील आहेत. इंडोनेशियातील जावा बेटावर सापडलेल्या विष्णुमूर्तींपैकी एका मूर्तीवर वर उल्लेख केलेल्या थायलंडमधील चैय्या येथील मूर्तीचा प्रभाव आहे. तर येथेच सापडलेल्या दुसऱ्या एका विष्णुमूर्तीत अधिक कोरीव काम केलेले आढळून येते. या चतुर्भुज विष्णूच्या हातात शंख, चक्र, गदा घेतलेली दिसून येते. या मूर्तीच्या मस्तकावर कोरीव किरीटमुकुट घातलेला आहे. या मूर्तीच्या कमरेच्या वस्त्रावरील चुण्यादेखील अत्यंत बारकाईने दाखवलेल्या आहेत. ही मूर्ती अंदाजे इसवीसनाच्या पाचव्या शतकाच्या सुरुवातीला म्हणजे दीड हजार वर्षांपूर्वी निर्माण करण्यात आली होती, असे अभ्यासकांचे मत आहे. या सुरुवातीच्या काळातील विष्णुमूर्तींखेरीज इतरही विष्णुमूर्ती इंडोनेशियामध्ये सापडतात. इंडोनेशियातील प्रंबानन येथील अकराशे वर्षांपूर्वी निर्माण केलेल्या प्रसिद्ध मंदिरसमूहात एक विष्णुमंदिरदेखील आहे.
इंडोनेशियातील दीड हजार वर्षांपूर्वीच्या पूर्णवर्मन नावाच्या राजाच्या एका शिलालेखाशेजारी दोन पावले कोरलेली आहेत. ही पावले त्रिविक्रम विष्णूची असल्याचे तसेच पूर्णवर्मन राजा हा विष्णुसमान असल्याचे त्या शिलालेखातून नमूद केलेलं आहे. भूतलावरील पूर्णवर्मन राजा हा विष्णूचा अवतार आहे, हे सांगण्याचा प्रयत्न राजाने या शिलालेखातून केलेला आहे.
आग्नेय आशियातील मोजक्याच विष्णुमूर्तींबद्दल माहिती करून देण्याचा प्रयत्न या लेखातून केलेला आहे. परंतु आग्नेय आशियातील या विविध देशांमध्ये विष्णूच्या अनेक मूर्ती सापडल्या आहेत. अगदी शैवपंथाइतका नसला तरी वैष्णवपंथाचा प्रभाव आग्नेय आशियातील या देशांमध्ये होता हे तेथील विष्णुमंदिरे, शिलालेख आणि मूर्तींवरून लक्षात येते.
(सदराचे लेखक सांस्कृतिक वारसा अभ्यासक आहेत.)
मूर्ती मालिका -१३
मूर्ती मालिका -१४
मूर्ती मालिका - १५
येरगी येथील काळम्मा
मूर्ती मालिका -१६
(छायाचित्र Vincent Pasmo
मूर्ती मालिका - १७
मूर्ती मालिका - १८
उमा महेश्वर (सिद्धेश्वर मंदिर, लातुर)
मूर्ती मालिका -१९
औंढा येथील नागनाथ ज्योतिर्लिंग मंदिर अभ्यासक भक्त शिल्पशास्त्राचे विद्यार्थी सर्वांसाठीच आकर्षणाचे ठिकाण आहे. या मंदिरावर विविध मूर्ती आहेत. त्यांचे आव्हान अभ्यासकांना नेहमीच राहिलेले आहे.सुखासनात बसलेली ही मूर्ती. वरच्या हातात त्रिशुळ आणि सर्प आहे. या सर्पाचा फणा उगारलेला नसून खाली झुकलेला शांत असा दाखवला आहे. खालचे दोन्ही हात वरद मुद्रेत आहे. डाव्या खालच्या हातात काय आहे लक्षात येत नाही पण अगदी याच मूद्रेतील इतर एका ठिकाणी याचे वर्णन शक्ती असे देगलुरकरांनी केले आहे. अभ्यासकांनी यावर प्रकाश टाकावा. तसेच त्रिशुळाच्या जागी खट्वांग आहे अशाही सुखासनातील मूर्ती आहेत.खाली बसलेला नंदीही मान खाली घालून शांत बसलेला आहे. शिवाच्या चेहर्यावरील भाव शांत आहेत. उजव्या पायाचा दूमडलेल्या पंजा शिल्पकाराने मोठा कलात्मक असा कोरलेला दिसून येतो. लांब कर्णभुषणे लक्ष वेधून घेतात. गळ्यात कमरेला पायात अगदी मोजकेच पण रेखीव अलंकार आहेत. एरवी शिवाचे अलंकार नागबंधादी किंवा उग्र असे दर्शवलेले असतात. हे बारकावे पाहिल्यावर हे शिल्पकार कुणी साधे पाथरवट नसून अभ्यासु साधना करणारे प्रतिभावंत असल्याची खुण पटते. पुरूष देहाचे सौंदर्य वर्णन करताना कमरेचे वर्णन "सिंहकटी" असे केलेले असते. या वर्णनात वरील मूर्ती बरोबर बसते. शिवाची कटी तशीच दाखवली आहे. औंढा नागनाथाला भेट देणार्यांना विनंती आहे कृपया घाईघाईने दर्शन आटोपून निघून जावू नका. अप्रतिम असा शिल्प खजिना मंदिरावर आहे. कोरणार्यांनी आपले आयुष्य पणाला लावले. तूम्ही डोळे भरून किमान पहा तरी. छायाचित्र सौजन्य
Travel Baba Voyage
विष्णुची शक्तीरूपे
अन्वा (ता. भोकरदन, जि. जालना) मंदिरावरील विष्णुची शक्ती रूपातील शिल्पे भारतीय मूर्तीशास्त्राला मोठे योगदान आहे असे अभ्यासक मानतात. हातातील आयुधे शंख चक्र गदा आणि पद्म यांचा जो क्रम आहे त्यानुसार विष्णुची २४ नावं आहेत. या २४ नावांसाठी २४ शक्ती आहेत. यातील उजव्या बाजूने म्हणजेच प्रदक्षिणा क्रमाने गदा, शंख, चक्र आणि डाव्या खालच्या हातात पद्म अशा विष्णुला वासुदेव संबोधले जाते. या छायाचित्रात याच क्रमाने आयुधे धारण केलेली जी स्त्री प्रतिमा आहे तीला लक्ष्मी असे संबोधले जाते (देवता म्हणून असलेली लक्ष्मी मूर्ती वेगळी). या मूर्तीचे शास्त्रा प्रमाणे केलेले विश्लेषण वेगळे. पण एक ललित कलाकृती म्हणूनही ही लोभस वाटते. उजवा हात ज्या पद्धतीने गदेवर टेकवला आहे, त्याचे लालित्य आणि गदेच्या सरळपणावर तोललेला सर्व शरिराचा भार, दूमडलेला उजवा पाय आणि रोवलेला तिरका डावा पाय, कमरेपासूनचे वरचे सर्व शरिर ९० अंशात फिरवून समोर आणले आहे जेंव्हा की पायाची दिशा वेगळी आहे. गदेच्या वरच्या टोकावर टेकवलेला पंजा हाच संपूर्ण शिल्पाचा तोल सांभाळणारा मध्यबिंदू जाणवतो. अन्वा मंदिरावर २४ पैकी १७ शक्ती रूप शिल्पे आजही शाबूत आहेत. त्यांचे शिल्पांकन शास्त्रा सोबतच शिल्प सौंदर्य म्हणूनही थक्क करणारे आहे.
शेषशायी विष्णु आणि समुद्रमंथनज्याठिकाणी बारवा, कुंड, पुष्करणी आहेत अशा जागी शेषशायी विष्णुचे शिल्प कोरलेले आढळून येते. हे शिल्प सहसा मंदिरावर नसते. मराठवाड्यातील प्राचीन बारवांमध्ये अशी शिल्पे आढळून आलेली आहेत. यातही हे शिल्प अजून वैशिष्ट्यपूर्ण आहे. कारण या ठिकाणी समुद्रमंथनाचा देखावा शिल्पांकित केला आहे. गोसावी पिंपळगांव (ता. सेलु, जि. परभणी) येथील दूर्लक्षीत असे प्राचीन मंदिर, तेथील बारव या परिसरांत आमचे भटके पुरातत्व प्रेमी मित्र मल्हारीकांत देशमुख यांना हे शिल्प आढळून आले. शेषशायी शिल्पांवर दशावतार कोरलेले असतात, अष्टदिक्पालांच्या प्रतिमा असतात. पण इथे समुद्र मंथनाचा प्रसंग कोरलेला आहे. देव आपल्या उजव्या बाजूला आहेत. त्यांच्या बाजूला वासुकीच्या शेपटाचा भाग आहे. दानव डाव्या बाजूला आहेत त्या बाजूला नेमका नागाचा फणा दाखवला आहे. जेणेकरून विषाची बाधा दानवांना व्हावी.विष्णुचे पाय चुरणारी लक्ष्मी दिसत नाही. तो भाग भंगला आहे. बाकी शंख, चक्र, गदा ही आयुधं स्पष्टपणे ओळखु येतात. असा शिल्पखजिना गावोगाव विखुरला आहे. गोसावी पिंपळगाव हे अडवळणाचे गाव. गावकर्यांनी मंदिर परिसर चांगला जपला आहे. अभ्यासकांनी अशा शिल्पांचा सविस्तर अभ्यास करून त्यांना प्रकाशात आणले पाहिजे. यातील शास्त्रीय बारकावे समोर आले पाहिजेत. ही विखुरलेली शिल्पे जिल्ह्याच्या ठिकाणी एकत्र आणून त्यांचे संग्रहालय झाले पाहिजे. परभणी जिल्हाधिकार्यांनी जिल्ह्यातील अभ्यासक, पुरातत्व प्रेमी, सामाजीक कार्यकर्ते यांची एक समिती नेमून या कामाला गती दिली आहे. त्यांचे मन:पूर्वक अभिनंदन. इतरही जिल्ह्यात असा पुढाकार जिल्हाधिकार्यांनी घ्यावा. त्याला सर्व इतिहास प्रेमींनी सहकार्य करावे ही अपेक्षा. (परभणी जिल्ह्याच्या समितीत मी स्वत: आहे. परभणी जिल्ह्यातील प्राचीन शिल्पे मुर्तीं बाबत काही माहिती असेल तर आम्हाला जरूर कळवा. २८ डिसेंबरपासून समितीचा स्थळ पहाणीचा दौरा सुरू होतो आहे) छायाचित्र सौजन्य Malharikant Deshmukh -श्रीकांत उमरीकर, औरंगाबाद, 9422878575.
छायाचित्र सौजन्य
विष्णुची शक्तीरूपे
द्राक्ष सुंदरी
व्याल मूर्ती
मंदिरांच्या भीतीवर, स्तंभांवर, द्वारशाखांवर दिसणारा अक्राळ विक्राळ चेहऱ्याचा हा प्राणी म्हणजेच ‘व्याल‘ होय. यालाच वारालक, वराल, वीराल,व्रलीका, वरालीक, अशी नावे आहेत. दक्षिण भारतात ‘याली‘ तर ओरिसात याला “बीडाल” म्हणतात.
व्याल निर्मिती नेमकी कधीपासून चालू झाली यावर अभ्यासकांत दुमत आहे. मात्र व्याल ही संकल्पना सिथीयन किंवा ऍकमेनिडियन(इराणी) शिल्पकलेतून गांधार स्थापतींच्या माध्यमातून मौर्यकालखंडात भारतात आली असावी. गुप्तकाळात आणि नंतर मध्ययुगात व्यालाचा वापर वाढला होता. मूळ इराणी परंपरेतील व्यालाला असलेले पंख मात्र भारतीय शिल्पात दिसून येत नाहीत. सांची स्तूपावरील आणि जुनागढ(क्षत्रप काळ) संग्रहालयातील व्याल हे पंखयुक्त आहेत.
नंतरच्या होयसळ, चौल, पल्लव या सर्वच स्थापत्यकारांनी व्यालाचा पुरेपूर वापर केला. दहाव्या शतकातील ब्रह्मपुरीश्वर मंदिरात व्यालाचा सर्वोत्कृष्ट आविष्कार बघायला मिळतो. या नंतरच्या विजयनगर स्थापत्यात व्याल मूर्ती सर्वाधिक वापरल्या गेल्या. कलात्मक दृष्ट्या खुजुराहो च्या व्यालमूर्ती डोळ्यात भरतात.
शिल्पशास्त्रातील अभ्यासक याला एक कल्पनाविलास मानतात, याच संकल्पनेतून विष्णूचा हायग्रीव, वराह अवतार, हत्तीची सोंड असलेला श्री गणेश, हनुमान, या देवता सुद्धा उत्क्रांत झालेल्या आहेत.
हीच पशु-मानव संकल्पना मूर्तिकारांनी मंदिरांच्या सुशोभिकरणासाठी वापरली आहे.
सुळे व जीभ बाहेर आलेली, आखूड कान, बटबटीत डोळे, उग्र अविर्भाव असे अर्ध मानव अर्ध प्राणी असलेले. माणसाचे धड त्यावर सिंहाचे शीर,सोबतच हत्ती, साप, वाघ, माकड, हरीण, कोंबडा, मोर अश्या अनेक प्राण्यांचे शरीरापासून बनलेले जवळपास विसपेक्षा जास्त प्रकारच्या व्यालमूर्ती श्री ढाके यांनी त्यांच्या प्रबंधात मांडल्या आहेत. वास्तुशिल्पात गजव्याल, अजव्याल, वृषव्याल, अश्वव्याल, सर्पव्याल, नरव्याल,सिंहव्याल, मेशव्याल,खरवव्याल, गंडकीव्याल, अशे अनेक प्रकारचे व्याल आपल्याला भारतात पाहायला मिळतात.
व्याल हे सहसा एकटे खोदले जात नाहीत, कधी ते हत्तीवर आरूढ झालेले, कधी हत्तीच्या पायाखाली चिरडले गेलेले, कधी आपल्या पाठीवर एखादी सुरसुंदरी वाहणारे, कधी झेप घेण्याच्या पवित्र्यात, कधी कोण्या योध्यासोबत युद्ध करताना, तर कधी द्वारशाखेत एकमेकांवर एक असे सलग व्याल खोदले जातात.
सोबत दिलेल्या छायाचित्रांमध्ये असेच काही व्याल मूर्ती दाखवलेले आहेत, पैकी तामिळनाडूच्या धारसुरम इथल्या मंदिरात स्तंभ तोलणारे व्याल किंवा याली हे विशेष असून, सिंहाचे शरीर, हत्तीची सोंड, शिंगे, गाईची शेपटी अस त्यांचं स्वरूप आहे.
सोळाव्या शतकानंतर मात्र मंदिरं स्थापत्यातील बाह्य नक्षीकाम मंदावले आणि आपसूकच व्यालमूर्ती सुद्धा मंदिर स्थापत्यातुन नाहीश्या झाल्या.







महेश तानाजी देसाई
#भ्रमणगाथा
#fearless Explores
https://bhatakbhavani4216.wordpress.com/2021/02/09/%e0%a4%b5%e0%a5%8d%e0%a4%af%e0%a4%be%e0%a4%b2-%e0%a4%ae%e0%a5%82%e0%a4%b0%e0%a5%8d%e0%a4%a4%e0%a5%80/
रहस्य महादेवाच्या पिंडीचे
By पं.नरेंद्र धारणे (धर्म अभ्यासक)
भगवान महादेवाचे भक्त श्रावणाबरोबरच वर्षभर शिवपूजा करत असतात. पूजेसाठी पिंडी कशी असावी, पूजेत कोणते साहित्य वापरावे व कोणते वापरू नये याला आध्यात्मिकदृष्ट्या महत्त्व आहे. अनेक भक्तांना तर याविषयी काही माहीत नसते. आपण आज याबद्दल काही महत्त्वाची माहिती जाणून घेणार आहोत.
देवघरातील पिंडी
-घरातील देवघरात महादेवाची पिंडी ठेवावी, मूर्ती नको.
-देवघरातील पिंडीवर नाग नसावा.
-पिंडी साधी दगडी असली तरी चालते, मात्र शक्यतो पितळेची असावी.
-देवघरातील पिंडी तीन इंचांपेक्षा मोठी असू नये, ती तीन इंचांपेक्षा छोटी असावी.
भगवान महादेव हे देवाधिदेव असून हे न्यायप्रिय दैवत आहे आणि त्यांचे सर्व प्रकारचे भक्त आहेत. जसे देव, दानव, यक्ष, किन्नर, भूत, प्रेत, पिशाच, आणि इतरही अनेक योनीजीव महादेवास भजतात. जेथे महादेवाची मूर्ती/चित्र असते तेथे त्यांचे सर्व भक्त उपस्थित होतात.
जोतिर्लिंगांच्या ठिकाणी तथा महादेवाच्या पिंडीला संपूर्ण गोल प्रदक्षिणा करीत नाहीत, तर अर्धी प्रदक्षिणा करून नमस्कार करतात कारण उत्तर दिशेला वरील सर्व भक्त अदृश्य रूपाने उपस्थित असतात, तथा उत्तर दिशेने महादेवाच्या पिंडीवर जलाभिषेक घातलेले पाणी तीर्थरूपाने वाहत असते, ते ओलांडून गेल्याचे पातक लागते.
महादेवाची मूर्ती फक्त स्मशानात असते, देवघरात महादेवाची मूर्ती नसावी. मानवाला पिंडीपूजन सांगितले आहे म्हणूनच संपूर्ण भारतात महादेवाच्या मुख्य शक्तिपीठांवर महादेवाची पिंडी लिंगरूपाने स्थापन केलेली समजते.
बारा ज्योतिर्लिंगे ही लिंगे म्हणजेच पिंडीरूपाने आहेत, यातून संपूर्ण विश्वाला वैश्विक ऊर्जा मिळते. महादेवाला नित्य शुद्ध पाण्यासह रुद्रसूक्त पठण करीत जलाभिषेक करावा. महादेवाला जल अतिप्रिय आहे. एखाद्याने महादेवास जल अर्पण केल्यास ते त्यावर खूप प्रसन्न होतात. महादेवाला मनापासून मोठ्या संख्येने एकत्र येऊन सामुदायिक जलरुद्राभिषेक केल्यास विपुल पर्जन्यमान राहते.
गुरुचरित्रात म्हटले आहे, की नित्याच्या रुद्राभिषेकाने दीर्घायुष्य, आरोग्य मिळते आणि अकाली मृत्यू टळतो.
श्रीमद्भागवतात म्हटले आहे, की महादेवाची नित्य नियमित रुद्राभिषेकाने सेवा केल्यास घरी अखंड लक्ष्मी वास करते आणि त्या भक्तांच्या घरी अखंड श्रिया राहते आणि सर्व सुखसमृद्धी वाढून सर्वत्र कीर्ती पसरते.
भगवान शंकराविषयी थोडी काळजी बाळगण्याची गरज असते. उत्साहाच्या भरात काही चुकीच्या गोष्टी आपल्या हातून घडत तर नाहीत ना, याकडे लक्ष देणे गरजेचे आहे.
खालील सात वस्तू भगवान शंकराला कधीही अर्पण करू नका. का? तर जाणून घ्या.
१. शंख ः शिवपुराणानुसार भगवान शंकराने शंखचूड नावाच्या असुराचा वध केला होता. तो भगवान विष्णूचा भक्त असल्याने त्याची आणि लक्ष्मीची शंखाने पूजा केली जाते.
२. हळद-कुंकू ः भगवान शंकर आजन्म वैरागी होते. त्यामुळे शृंगाराशी संबंधी कोणतीही वस्तू त्यांना अर्पण केली जात नाही. हळदीलाही सौंदर्यवर्धक मानले जाते. त्यामुळेच हळद किंवा कुंकू भगवान शंकराला अर्पण केले जात नाही. या गोष्टी भगवान विष्णूला अर्पण केल्या जातात.
३. तुळशीपत्र ः असुरांचा राजा जलंधर याच्याविषयी असलेल्या एका कथेनुसार त्याची पत्नी वृंदा तुळशीचे रोपटे बनून गेली होती. भगवान शंकरांनी जलंधराचा वध केला होता. त्यामुळे भगवान शंकराच्या पूजेत तुळशीपत्र न वापरण्याचा पण वृंदाने केला होता.
४. नारळपाणी ः नारळाच्या पाण्याचा भगवान शंकरावर अभिषेक केला जात नाही. नारळाला लक्ष्मीचे रूप मानले जाते. म्हणून शुभकार्यात नारळाचा वापर करून त्याचा प्रसाद म्हणून वापर केला
जातो. पण, भगवान शंकराला अर्पण केलेले पाणी निर्माल्य होते.
५. उकळलेले दूध ः उकळलेले दूध किंवा बाजारात मिळणारे पॅकेटमधील दूध कधीही भगवान शंकराला अर्पण करू नये. त्यापेक्षा गंगाजलाने अभिषेक करा. बाजारात मिळणारे पॅकेटमधील दूधही उकळलेले असते. त्यामुळेच त्याचा वापर करणेही टाळावे.
६. केवड्याचे फूल ः भगवान शिवाच्या पूजेत केवड्याचे फूल वर्जित आहे. शिवपुराणानुसार ब्रह्मदेव आणि विष्णूच्या वादात खोटे बोलल्यामुळे केवड्याला भगवान शंकराने शाप दिला होता.
७. कुंकू किंवा शेंदूर ः कुंकू किंवा शेंदुराचा वापरही भगवान शंकराची पूजा करण्यात वर्ज्य केला आहे.
।।ॐ नमः शिवाय।।
(लेखक ज्योतिषशास्त्राचे अभ्यासक आहेत.)
व्याल मूर्ती
मंदिरांच्या भीतीवर, स्तंभांवर, द्वारशाखांवर दिसणारा अक्राळ विक्राळ चेहऱ्याचा हा प्राणी म्हणजेच ‘व्याल‘ होय. यालाच वारालक, वराल, वीराल,व्रलीका, वरालीक, अशी नावे आहेत. दक्षिण भारतात ‘याली‘ तर ओरिसात याला “बीडाल” म्हणतात.
व्याल निर्मिती नेमकी कधीपासून चालू झाली यावर अभ्यासकांत दुमत आहे. मात्र व्याल ही संकल्पना सिथीयन किंवा ऍकमेनिडियन(इराणी) शिल्पकलेतून गांधार स्थापतींच्या माध्यमातून मौर्यकालखंडात भारतात आली असावी. गुप्तकाळात आणि नंतर मध्ययुगात व्यालाचा वापर वाढला होता. मूळ इराणी परंपरेतील व्यालाला असलेले पंख मात्र भारतीय शिल्पात दिसून येत नाहीत. सांची स्तूपावरील आणि जुनागढ(क्षत्रप काळ) संग्रहालयातील व्याल हे पंखयुक्त आहेत.
नंतरच्या होयसळ, चौल, पल्लव या सर्वच स्थापत्यकारांनी व्यालाचा पुरेपूर वापर केला. दहाव्या शतकातील ब्रह्मपुरीश्वर मंदिरात व्यालाचा सर्वोत्कृष्ट आविष्कार बघायला मिळतो. या नंतरच्या विजयनगर स्थापत्यात व्याल मूर्ती सर्वाधिक वापरल्या गेल्या. कलात्मक दृष्ट्या खुजुराहो च्या व्यालमूर्ती डोळ्यात भरतात.
शिल्पशास्त्रातील अभ्यासक याला एक कल्पनाविलास मानतात, याच संकल्पनेतून विष्णूचा हायग्रीव, वराह अवतार, हत्तीची सोंड असलेला श्री गणेश, हनुमान, या देवता सुद्धा उत्क्रांत झालेल्या आहेत.
हीच पशु-मानव संकल्पना मूर्तिकारांनी मंदिरांच्या सुशोभिकरणासाठी वापरली आहे.
सुळे व जीभ बाहेर आलेली, आखूड कान, बटबटीत डोळे, उग्र अविर्भाव असे अर्ध मानव अर्ध प्राणी असलेले. माणसाचे धड त्यावर सिंहाचे शीर,सोबतच हत्ती, साप, वाघ, माकड, हरीण, कोंबडा, मोर अश्या अनेक प्राण्यांचे शरीरापासून बनलेले जवळपास विसपेक्षा जास्त प्रकारच्या व्यालमूर्ती श्री ढाके यांनी त्यांच्या प्रबंधात मांडल्या आहेत. वास्तुशिल्पात गजव्याल, अजव्याल, वृषव्याल, अश्वव्याल, सर्पव्याल, नरव्याल,सिंहव्याल, मेशव्याल,खरवव्याल, गंडकीव्याल, अशे अनेक प्रकारचे व्याल आपल्याला भारतात पाहायला मिळतात.
व्याल हे सहसा एकटे खोदले जात नाहीत, कधी ते हत्तीवर आरूढ झालेले, कधी हत्तीच्या पायाखाली चिरडले गेलेले, कधी आपल्या पाठीवर एखादी सुरसुंदरी वाहणारे, कधी झेप घेण्याच्या पवित्र्यात, कधी कोण्या योध्यासोबत युद्ध करताना, तर कधी द्वारशाखेत एकमेकांवर एक असे सलग व्याल खोदले जातात.
सोबत दिलेल्या छायाचित्रांमध्ये असेच काही व्याल मूर्ती दाखवलेले आहेत, पैकी तामिळनाडूच्या धारसुरम इथल्या मंदिरात स्तंभ तोलणारे व्याल किंवा याली हे विशेष असून, सिंहाचे शरीर, हत्तीची सोंड, शिंगे, गाईची शेपटी अस त्यांचं स्वरूप आहे.
सोळाव्या शतकानंतर मात्र मंदिरं स्थापत्यातील बाह्य नक्षीकाम मंदावले आणि आपसूकच व्यालमूर्ती सुद्धा मंदिर स्थापत्यातुन नाहीश्या झाल्या.







महेश तानाजी देसाई
#भ्रमणगाथा
#fearless Explores
https://bhatakbhavani4216.wordpress.com/2021/02/09/%e0%a4%b5%e0%a5%8d%e0%a4%af%e0%a4%be%e0%a4%b2-%e0%a4%ae%e0%a5%82%e0%a4%b0%e0%a5%8d%e0%a4%a4%e0%a5%80/
किर्तीमुख
अनेक मंदिरांच्या प्रवेशव्दारापाशी एक राक्षसाच्या मुखासारख एक शिल्प कोरलेले दिसते.मुख्यत: शिवाच्या मंदिरात गर्भगृहाच्या उंबरठ्यावर. या शिल्पाच नाव आहे "किर्तीमुख". ही किर्तीमुख मंदिराच्या प्रवेशव्दारापाशी ठेवण्या मागची सुध्दा एक पौराणिक कथा आहे.. जालंधर नावाचा एक राक्षस होतो. त्याला प्रचंड भुक लागायची.कितीही खाल्ले तरी त्याची भुक कधी शमायची नाही. तो महादेवाचा भक्त होता त्याने घोर तपश्चर्या केली. कालांतराने महादेव त्याला प्रसन्न झाले.महादेवाने त्याला वर मागण्याची आज्ञा दिली. तेंव्हा प्रचंड भूकेची जाणीव झालेल्या त्या असूराने भुकेपासून मुक्ती मिळावी हि प्रार्थना केली. महादेवाने त्याला स्वत:च शरीर पायापासून खायला सांगितले,त्या असुराने तसे केलं, तरीही त्याची भूक भागली नाही. त्यावर उपाय म्हणून शंकराने त्याला सांगितले, की तू माझ्या दारात येऊन बस आणि येणार्या जाणार्या सर्व भाविकांची पाप खा. तुला ती कधीच कमी पडणार नाही. तेव्हा पासून या किर्तीमुखाच शिल्प शिवमंदिराच्या दारात कोरण्याची प्रथा रुढ झाली. अनेक मंदिराच्या प्रवेशद्वाराच्या शेजारी ही किर्तीमुख आहेत.
अनेक ठिकाणी लहान लहान किर्तीमुखांतून फुलाच्या माळांची तोरण विणलेली दाखेवलेली आहेत.मंदिरांवर किर्तीमुखाची विविध स्वरुपातील शिल्पे आढळतात. खिद्रापुरच्या कोपेश्वर मंदिरावर जवळजवळ सोळा प्रकारात सादर केलेली किर्तीमुख त्यातील कलाकुसर यास तोड नाही. या प्रत्येक किर्तीमुखाची ठेवण वेगळी आहे. नक्षीकाम करणार्याने शिवापार्वतीलाही किर्तीमुखात बद्ध केलेले आहे. अनेक ठिकाणी किर्तीमुखातील नक्षीकामातून मोर आणि हंस साकारलेले दिसतात, याशिवाय फळफुले सुध्दा बहरलेली दिसतात. काही ठिकाणी व्याघ्र ही साकारलेले दिसतात. वानर सुद्धा किर्तीमुखाच्या शिल्पात दाखवितात. काही मंदिरात सभामंडपातही खांबांवर किर्तीमुख कोरलेली आहेत. कालांतराने या कथेचे पौराणिक संदर्भ पुसट झाले व किर्तीमुख हे डेकोरेटिव्ह मोटिफ म्हणुन मंदिर स्थापत्यामध्ये वापरले जाऊ लागले.
1. ब्रह्मचारी गणेश:
एकामध्ये गणपती हा ब्रह्मचारी ब्रह्मचारी मानला जातो व त्याला रूढार्थाने पत्नी नाही.
2. दुसरी परंपरा- गणेश व रिद्धी सिद्धी
बहुतांशी देवांना साधारण एक पत्नी आणि एक व अधिक शक्ती कल्पिले गेल्या आहेत. ब्रह्मदेवाने तीन वर किंवा मूल्ये म्हणून रिद्धी, सिद्धी व बुद्धी गणपतीला प्रदान केल्या आहेत असे मानले जाते. त्यांनाच स्त्री स्वरूपात कल्पून गणेशाच्या बाजूला आपल्याला रिद्धी व सिद्धी यांचे अंकन दिसते. असे अंकन पेशवे काळापासून पुढे सामान्यतः सापडते पण त्याचे काही पूर्व मध्ययुगीन अंकन औंढा, हिंगोली येथील नागनाथ ज्योतिलिंग मंदिरावर ही आढळून येते. अनेक ठिकाणी त्यानं पत्नी मानत नसल्यामुळे त्यांना गणेशाच्या दोन्ही बाजूस उभे दाखवण्याची पद्धत आहे.
# रिद्धीसिद्धी समावेत गणेश- नागनाथ मंदिर, औंढा, हिंगोली, महाराष्ट्र 12वे शतक
3. तिसरी परंपरा -शक्ती गणेश
# शक्ती गणेश- मध्यप्रदेश- बारावे शतक- खाजगी संग्रह
साधारण सहाव्या शतकापासून भारतात गणेशाच्या विविध शक्तींसोबत मूर्ती आढळतात. त्यात स्रीरूपी शक्ती, गणेशाच्या मांडीवर किंवा बाजूला बसलेल्या दाखवल्या असून गणेशाची सोंड त्यांच्या हनुवटीला किंवा गुप्तांगाना स्पर्श करताना धकावलेली असते. तंत्रमार्गातील अश्या गणेशमूर्तींना "शक्ती गणेश" किंवा "उच्छिष्ट गणेश"असे म्हणतात.
नारद पुराणात "उच्छिष्ट गणपती उपासना" दिलेली आहे ज्यात विविध गणेश व त्यांच्या शक्तींची नांवे उद्धृत केली आहेत. तसेच, ब्रह्मांड पुराण व शारदातीलक या ग्रंथांमध्येही गणेश व शक्तींची नावे आढळतात.
4. चौथी परंपरा- शारदा गणेश:
गणेशाचे शारदा म्हणजेच सरस्वती व लक्ष्मीबरोबर अंकन दाखवण्याची परंपरा संपूर्ण सांसारिक सुखाशी निगडित आहे. महाराष्ट्रात याचे सर्वात जुने अंकन हे पन्हाळेकाजी येथील नाथपंथी लेण्यांमध्ये पाहायला मिळते. क्वचित प्रसंगी, आधुनिक काळातील मूर्तींमध्ये बुद्धीच्या जागी सरस्वतीला आणि रिद्धीच्या जागी लक्ष्मीला कल्पून अंकन केलेले आढळते.
बुद्धीच्या देवता हे समान कार्यक्षेत्र असल्यामुळे म्हणून अनेकदा गणपती व शारदेला एकत्र दाखवण्याची पद्धत आहे. अश्या मूर्तींमध्ये शारदा की गणेशाची पत्नी असावी, अशी कल्पना केलेली आढळते. पण,अश्या मूर्तींना कुठलाही मूर्तीशास्त्रीय आधार नाही. भक्तांच्या कल्पना शक्तीचा तो आविष्कार समजावा लागेल.
# 19व्या शतकातील कंपनी शैलीतील पेन्सिल स्केच
उदा. पुण्याच्या मंडई येथील शारदा गणेश ही मूर्ती 127 वषे जुनी असून तिच्या वेगळेपणामुळे भरपूर लोकप्रिय आहे.
महात्मा फुले मंडई (पूर्वीचे रे मार्केट) येथे नथुराम डोंगरे पैलवान म्हणू प्रसिद्ध होते. तुळजापूरची तुळजाभवानी ह्या त्यांच्या कुलदेवतेला त्यांनी संतती होण्यासाठी नवस केला व संतती झाल्यावर पूर्ण केला. त्या मंदिरावरील शारदा गणेशाची मूर्ती त्यांनी पहिली होती. आख्यायिका सांगते की देवी तुळजाभवानी, डोंगरे यांच्या स्वप्नात येऊन यांना शारदा गणेशाची मूर्ती निर्माण करून तिची पूजा करावयास सांगून गेली. त्याप्रमाणे त्यांनी ही वेगळी शारदा गणेशाची मूर्ती, नाईक कुंभार यांना घडवायला सांगितली. ही कागदी लगद्यापासून केलेली मूर्ती घडवताना सांगलीचे संस्थानिक, पटवर्धन यांचे मार्गदर्शन लाभले.
नवदुर्गा - प्रतिमा शास्त्रीय लक्षण
कलेच्या क्षेत्रात दुर्गा देवीच्या मूर्तीची निर्मिती कधी पासून प्रारंभ झाली हे निश्चित सांगता येत नसले तरी साधारणतः शुंग कालपासून पाषाण निर्मित दुर्गा देवी पहावयास मिळते. असे काही अभ्यासक मानतात. कारण या पाषाण शिल्पात सिंह ही काही ठिकाणी कोरलेला आढळून आला आहे. गुप्त काळात दुर्गा देवीची अशी अनेक शिल्प आहेत. ज्या मध्ये स्कंद कार्तिकेय देवीच्या मांडीवर बसलेला कोरलेला आहे. गुप्त काळानंतर सिंह वहिनी दुर्गा प्रतिमा मोठ्या प्रमाणात निर्माण झालेल्या दिसतात. देवी महात्म्य, मत्स्यपुराण, रूपमंडन या ग्रंथात देवीस कात्यायनी म्हटलेले आहे.
निरनिराळी रूपें घेऊन आदिशक्तीने चण्ड, मुण्ड, शुंभ, निशुंभ, वगैरे राक्षसाचा संहार केला. त्यात महिषासुरांचा संहार करणारी जी देवी तिला दुर्गा असें म्हणतात. रंभ नावाच्या असुराला महिषीपासून अग्नीच्या प्रसादाने झालेला मुलगा महिषासुर याने ब्रह्मदेवाची आराधना केली. त्याच्या इच्छेप्रमाणें त्याला अमरत्व तर मिळाले नाही पण एवढी सूट मिळाली की, त्याचे मरण स्त्री शिवाय दुसऱ्याच्या हातून होणार नाही. स्त्री ही अबला असल्यामुळे आपणास कोणतीही भीती असणार नाही, असे समजून महिषाने पराक्रम गाजविण्यास सुरवात केली आणि देवांना सगळी- कडून हुसकवून लावले. इंद्र, अग्नी, वायू, चंद्रमा, यम, वरून इत्यादी देवतांचे अधिकार स्वतः उपभोगू लागला. स्वर्गावर नियंत्रण प्रस्थापित केले. ब्रम्हा, विष्णु व शंकराच्या नेतृत्वाखाली सर्व देवांनी आपापल्या सम्मिलित तेजाने एक स्त्री उत्पन्न केली. (शिव तेजाने देवीचे मुख, यमाच्या तेजाने केश, विष्णूच्या तेजाने भुजा, चंद्रमाच्या तेजाने वक्ष:स्थल, इंद्राच्या तेजाने कटीप्रदेश, वरूनाच्या तेजाने जंघा आणि मांड्या, पृथ्वीच्या तेजाने नितंब निर्माण झाले. अशाच प्रकारे ब्रम्हाच्या तेजाने चरण तथा सूर्याच्या तेजाने पायाची बोटे, कुबेराच्या तेजाने नासिका, प्रजापतीच्या तेजाने दात, अग्नीच्या तेजाने तीन नेत्र, संध्याच्या तेजाने बाहू तथा वायूच्या तेजाने कान निर्माण झाले. अशा प्रकारे प्रसन्न देवतांनी आपले आयुधे देवीस दिले.) हीच महाशक्ति होय. हिचेच निरनिराळ्या रूपाने वर्णन मिळते. याच देवीने पुढे महिषासुराचा वध केला व पुनश्च दैवी संपत्ति आणि समृद्धीची स्थापना केली. तिचे वाहन अर्थात् सिंह हा तिला हिमालयाकडून मिळाला होता. त्याचप्रमाणें निरनिराळी आयुधें ही वेगवेगळ्या देवांकडून मिळाली. आज देशांत साधारणपणे ज्या दुर्गेची आराधना चालू आहे ती महिषासुरमर्दिनी दुर्गा होय. तिचे बाहू, आयुधे, रूप वगैरेचा विस्तार फार मोठा आहे. पण ढोबळमानाने नवदुर्गा म्हणून हिची नऊ रूपें - शैलपुत्री, ब्रह्मचारिणी, चित्रघंटा, कूष्माण्डा, स्कन्दमाता, कात्यायनी, कालरात्री, महागौरी आणि सिद्धिदा प्रसिद्ध आहेत. ही नांवे काशीकडे आहेत. इतरत्र नावात भिन्नता आहे. देवीच्या या रुपास विशेष रूप किंवा विशेष अवतार असे म्हणता येईल. देवीचे रूप हे शक्ती समुच्चयाचे प्रतीक असल्याने कदाचित याच मुळे सर्वाधिक दुर्गा देवीच्या मूर्ती निर्माण केल्या असाव्यात.
शिव-शक्ती दुर्गा (दुर्गा-वैरोचनी) चा सर्वात प्राचीन संदर्भ तैत्तिरीय अरण्यकमध्ये उपलब्ध आहे. येथे रुद्राचे वर्णन दुर्गा वैरोचनी असे केले आहे, जे त्याच्या पत्नी अंबिकेच्या अनेक नावांपैकी एक आहे. बौधायन गृह्य सूत्रात दुर्गेच्या उपासनेच्या पद्धतीचे वर्णन केले आहे, परंतु पौराणिक कालखंडात आढळणारे तिच्या व्यक्तिमत्त्वाचे अनेक पैलू आजपर्यंत समोर आले नव्हते. उदाहरणार्थ, या काळात दुर्गेशी संबंधित सिंहाची कल्पना अजून आली नव्हती. गृह्यसूत्रांच्या काळापर्यंत सिंहाच्या उग्र आणि सौम्य स्वरूपाची कल्पना जन्माला आली होती. महाभारतातील दुर्गास्तोत्रानेही याची पुष्टी केली आहे.
पौराणिक कालखंडात दुर्गेच्या अनेक पैलूंची तपशीलवार कल्पना केलेली दिसते. मार्कंडेय पुराणातील देवीमाहात्म्यामध्ये संध्या, सरस्वती, चंडिका, गौरी, महालक्ष्मी, ललिता इत्यादी दुर्गेची अनेक नावे काल्पनिक वयाच्या आधारे देण्यात आली आहेत. एक वर्षाची मुलगी संध्या, दोन वर्षांची सरस्वती, सात वर्षांची चंडिका, आठ वर्षांची शांभवी, नऊवर्षाची दुर्गा, दहा वर्षांची गौरी, तेरा वर्षांची महालक्ष्मी आणि सोळा वर्षांची ललिता अशी त्यांची नावे आहेत.
दुर्गेस गृह्यसूत्रांमध्ये एक महत्त्वाची देवी म्हणून वर्णन केले आहे आणि महाभारतातील सर्वोच्च अस्तित्व म्हणून स्वीकारले गेले आहे. पुराण आणि आगम साहित्यात नऊ प्रकारच्या दुर्गा (नवदुर्गा) सांगितल्या आहेत. या नवदुर्गा मूर्तींची नावे मार्कंडेयपुराण, अग्निपुराण, गरुडपुराण आणि आगमामध्येही उपलब्ध आहेत. पुराण आणि आगमाच्या वरील वर्णनांप्रमाणेच, इतर वास्तुशास्त्रातही दुर्गा (नवदुर्गा) च्या नऊ मूर्तींचे वर्णन केले आहे, परंतु वरील शास्त्रांच्या नवदुर्गा-सूचीचे कोणत्याही सूचीशी पूर्ण साम्य नाही, फक्त क्षेमंकरी आणि हरसिद्धी हे दोन नाव आगमाच्या यादीतून घेतलेले दिसतात. अपराजितपृच्छ आणि देवतामूर्तीप्रकरणात दुर्गेच्या सर्व नऊ मूर्तींचे वर्णन आहे आणि रूपमंडनमध्ये फक्त तीन मूर्तींचा उल्लेख आहे. अपराजितपृच्छात नमूद केलेल्या नव दुर्गा मूर्ती म्हणजे महालक्ष्मी, नंदा, क्षेमंकरी, शिवदुती, महारंडा, भ्रमरी, सर्वमंगला, रेवती आणि हरसिद्धी. देवमूर्तीप्रकरणातही याच दुर्गेच्या मूर्तींचे वर्णन आहे, फक्त दोन नावांमध्ये काही बदल झाले आहेत. येथे शिवदूतीला सर्वती आणि भ्रमरीला भ्रमणी असे म्हणतात. रूपमंडनमध्ये महालक्ष्मी, क्षेमांकरी आणि हरसिद्धी या तीन दुर्गा मूर्तींचा उल्लेख आहे. अपराजितपृच्छ आणि रूपमंडनमध्ये या दुर्गा मूर्तींचे वाहन सिंह असे वर्णन केले आहे. इतर प्राचीन धर्मग्रंथांपैकी अग्निपुराण आणि गरुडपुराणातही दुर्गेच्या सिंह वाहनाचे वर्णन आढळते. उल्लेख केलेल्या सर्व दुर्गा मूर्ती चतुर्भुज आहेत. त्यांचे वेगवेगळे तपशील पुढीलप्रमाणे आहेत.
मार्कंडेयपुराणामध्ये वर्णन केलेल्या नवदुर्गा मूर्ती शैलपुत्री, ब्रह्मचारिणी, चंद्रघंटा, कुष्मांडा, स्कंदमाता कात्यायनी, कालरात्री महागौरी आणि सिद्धिदात्री अशा सांगितल्या आहेत. तर अग्निपुराण नुसार रूद्रचंडा, प्रचंडा, चंडोग्रा, चंडनायिका, चंडा, चंडवती, चंडरुपा, अतीचंडा आणि उग्रचंडा ही नावे येतात तर आगम ग्रंथानुसार नीलकंठी, क्षेमंकरी, हरसिद्धी, रुद्राक्षदुर्गा, वनदुर्गा, अग्निदुर्गा, जयदुर्गा, विद्यावासिनी आणि रिपुमर्दिनीदुर्गा सांगितले आहे. तसेच अपराजितपृच्छा नुसार महालक्ष्मी, नंदा, क्षेमंकरी, शिवदुती, महारंडा, भ्रमरी, सर्वमंगला, रेवती आणि हरसिद्धी असे वर्णन उपलब्ध होते. दुर्गा सप्तशतीमध्ये शैलपुत्री, ब्रह्मचारिणी, चंद्रघंटा, कुष्मंडी, स्कंदमाता, कात्यायनी, कालरात्री, महागौरी आणि सिद्धिदात्री या नवदुर्गांचा उल्लेख आहे.
प्रतिमा शास्त्रानुसार देवीच्या हातांच्या संख्येचे पुढील प्रमाणे वर्णन करण्यात आले आहे.
महालक्ष्मी, नंदा, क्षेमंकरी, शिवदुती, महाचंडा, भ्रमरी सर्वमंगला, रेवती, हरसिद्धी या चतुर्भुज तर कात्यायनी दशभुजा, भद्रकाली अष्टादशभुजा (१८), दुर्गा षोडशभुजा किंवा अष्टादशभुजा (१६/१८), चामुंडा चतुर्भुज किंवा अष्टभुजा (४/८) असाव्यात.
देवी शिल्पात विविध भुजाधारिनी कोरलेली पहावयास मिळते. देवीच्या मूर्तीतील वरील हातात कधी कधी एखादी दोर किंवा साप सदृश्य वस्तू दाखविण्यात येते. त्यास काही अभ्यासक केसांच्या जटा किंवा केसात माळण्यासाठी असलेली माला संबोधतात. परंतु वामन पुराणानुसार, 'रुरू नावांच्या असुराने कालीवर आक्रमण केले. तिने आपल्या खट्वांगाने त्याला मारले व असुराचे कानापासून पायापर्यंतचे कातडे काढून त्याने आपल्या जटा बांधल्या. एक अवखळ जटा बांधली जात नाही असे पाहून तिने तिला उपटून जमिनीवर रागाने आपटले. भूमिवर पडलेल्या त्या जटेपासून चण्डमारीची उत्पत्ति झाली.' अशी कथा येते. याच कथेवर आधारित एक मूर्ती बीड जिल्ह्यातील अंबाजोगाई तालुक्यातील धर्मापुरी येथील केदारेश्वर मंदिरावरील बाह्यांगवर पहायला मिळते. (प्रस्तुत मूर्ती आमच्या मूर्ती शास्त्र अभ्यास सहलीत अनेक चर्चेअंती काली असल्याचे शिक्का मोर्तब झाले. परंतु दैत्य कोण हे लक्षात येत नव्हते. बऱ्याच ग्रंथात धुंडोळा घेतल्या नंतर मी आणि श्री लक्ष्मीकांत सोनवटकरांनी ही रुरू या दैत्याला मारणारी वामन पुराणातील काली असल्याचे मराठवाडा इतिहास परिषदेत सिध्द केले.)
नवदुर्गा हिचे मूर्ती शास्त्रीय लांच्छने या अनुषंगाने आपण देविरुप पुढील प्रमाणे पहाणार आहोत.
धार्मिक ग्रंथानुसार आजचे रुप क्षेमंकरी असले तरी प्रतिमा लक्षणानुसार पहिले रूप हे महालक्ष्मी आहे. (अपराजितपृच्छ, रूपमंडन, देवतामूर्तीप्रकरण)
महालक्ष्मी -
या दुर्गेच्या मूर्तीचे वर्णन तिन्ही शास्त्रांमध्ये आहे. या शास्त्रानुसार महालक्ष्मीच्या निळ्या गळ्यात नाग धारण केलेला असावा आणि तिचा एक हात वरद मुद्रेमध्ये आणि उरलेले तीन हात त्रिशूल, खेटक आणि पानपात्र सोबत असावेत. शिल्पकलेतील दुर्गेच्या महालक्ष्मी-स्वरूपाचे चित्रण दुर्मिळ आहे. वर सांगितलेली शास्त्रवर्णनाशी तंतोतंत जुळणारे महालक्ष्मीचे एकमेव शिल्प चित्तौडगड-विजय स्तंभवरील 'नवदुर्गा समूहा'मध्ये आढळते.
नंदा:
या मूर्तीचे वर्णन केवळ अपराजितपृच्छा आणि देवतामूर्तीप्रकरणात केले आहे, रूपमंडन मध्ये उपलब्ध नाही. अपराजितपृच्छा आणि देवतामूर्तिप्रकरणावरून असे ज्ञात होते की, देवी नंदाच्या हातात अनुक्रमे अक्षसूत्र, खड्ग, खेटक आणि पानपात्र असावे.
क्षेमंकरी-
क्षेमंकरीची प्रतिमा-लक्षणे तिन्ही शास्त्रांमध्ये आहेत, परंतु यातील रूपमंडनाचे वर्णन इतर दोन ग्रंथांतील वर्णनांपेक्षा काहीसे वेगळे आहे. अपराजितपृच्छा आणि देवतामूर्तिप्रकरणानुसार क्षेमंकरीचा एक हात वरद मुद्रेमध्ये असावा आणि उरलेल्या तीन हातात अनुक्रमे त्रिशूळ, कमळ आणि पानपात्र असावे. रूपमंडनमध्ये क्षेमंकरीच्या हातात अनुक्रमे वरद मुद्रा, त्रिशूल, खेटक आणि पानपात्र असे वर्णन केले आहे. त्यामुळे देवीच्या तिसर्या हातातील कमळाऐवजी खेटकाचा उल्लेख बदलून महालक्ष्मी व क्षेमंकरी यांच्या हातातील शस्त्रे एकच असल्याचे सांगितले जाते.
शिवदूती किंवा सर्वती-
दुर्गेच्या चौथ्या मूर्तीला अपराजितपृच्छा मध्ये शिवदूती आणि देवतामूर्तीप्रकरणात सर्वती असे म्हटले जाते, परंतु दोन्ही शास्त्रात उपलब्ध या मूर्तीची वैशिष्ट्ये सारखीच आहेत. रूपमंडन मध्ये या मूर्तीचा उल्लेख नाही. इतर दोन शास्त्रांनुसार, दुर्गेची ही मूर्ती कमंडलू, चक्र, खेटक आणि पानपात्राने सुसज्ज असावी. शिल्पकलेमध्ये महालक्ष्मी आणि नंदाप्रमाणे दुर्गेच्या शिवदुती किंवा सर्वती स्वरूपाचे दुर्मिळ चित्रण आढळते.
महारंडा –
महारंडाचा उल्लेख रूपमंडनमध्ये नाही आणि या मूर्तीची वैशिष्ट्ये इतर दोन शास्त्रांमध्ये काही वेगळ्या प्रकारे दिली आहेत. अपराजितपृच्छा नुसार महारंडाची मूर्ती खड्ग, त्रिशूळ, घंटा आणि खेटक यांनी सज्ज असावी, तर देवतामूर्तीप्रकरणात महारंडा अनुक्रमे खड्ग, त्रिशूळ, घंटा आणि पानपात्र या लांच्छणाने सुसज्ज असल्याचे सांगितले आहे. त्यामुळे देवतामूर्तीप्रकरणात देवीच्या शेवटच्या हातातील पात्राचा उल्लेख खेटकाऐवजी बदलला आहे. शिल्पकलेमध्ये क्षेमंकारीप्रमाणेच महारंडाचे सामूहिक आणि स्वतंत्र अशा दोन्ही स्वरूपात चित्रण करण्यात आले होते.
भ्रमरी किंवा भ्रमणी- महारांडाप्रमाणेच या दुर्गेच्या मूर्तीचा उल्लेखही रूपमंडनमध्ये नाही आणि इतर दोन ग्रंथांमध्येही देवीचे नाव आणि तिच्या शेवटच्या हातातील शस्त्र बदलले आहे. अपराजितपृच्छात दुर्गेच्या सहाव्या मूर्तीला भ्रमरी असे म्हणतात आणि तिच्या हातात अनुक्रमे खड्ग, डमरू, खेटक आणि पानपात्र असल्याचे वर्णन केले आहे, तर देवतामूर्तीप्रकरणात दुर्गेच्या सहाव्या मूर्तीचे नाव भ्रमणी आणि शेवटच्या हातात पानपात्र ऐवजी पाश असल्याचा उल्लेख आहे आणि इतर तीन हातांची शस्त्रे निश्चितपणे खड्ग, डमरू आणि खेटक आहेत. शिल्पकले मध्ये भ्रमरी किंवा भ्रमणी यांच्या वरील वर्णनांशी साधर्म्य असलेली मूर्ती दुर्मिळ आहेत.
सर्वमंगला-
सर्वमंगलाचा उल्लेख केवळ अपराजितपृच्छा आणि देवतामूर्तीप्रकरणात आहे, रूपमंडनमध्ये नाही. अपराजितपृच्छा आणि देवतामूर्तीप्रकरण नुसार, सर्वमंगला आपल्या हातात अनुक्रमे अक्षसूत्र, वज्र, घंटा आणि पात्र धारण करते.
रेवती-
सर्वमंगलाप्रमाणे रेवतीचा उल्लेख रूपमंडन मध्ये नाही आणि इतर दोन शास्त्रांमध्ये वर्णन केलेली या देवीची हातातील शस्त्रे सारखीच आहेत. अपराजितपृच्छा आणि देवतामूर्तिप्रकरण या दोन शास्त्रांनुसार, रेवतीच्या हातात अनुक्रमे दंड, त्रिशूळ, खटवांग आणि पानपात्र असले पाहिजेत.
हरसिद्धी-
हरसिद्धीचे मूर्ती लक्षण तीनही शास्त्रांमध्ये आढळते. या शास्त्रानुसार हरसिद्धीने आपल्या हातात अनुक्रमे कमंडलू, खड्ग, डमरू आणि पानपात्र धारण केले पाहिजे.
सामुहिक चित्रणांमध्ये वरील प्रमाणे उल्लेखित मूर्ती या केवळ चित्तोडगड-विजय स्तंभाच्या नवदुर्गा-समूहात कोरलेल्या आढळून येतात.
संदर्भ ग्रंथ कर्त्याचे आभार
🙏🏻
पाल शिल्प कलेतील मातृ भावना...
माणकेश्वर मंदिरावरील कर्पूरमंजिरी
शिल्पकलेतील त्रिपुरांतक शिव आणि त्रिपुरारी पौर्णिमा
आलिंगन - अद्वैताचे पहिले प्रतीक
शोध - शीतला देवीचा'
आज शीतला सप्तमी निमित्ताने.....
ठिकाण - मुखेड, महाराष्ट्र आणि तेलंगणा सीमेवर वसलेले तालुक्याचे गाव.
स्थळ - दशरथेश्वेर मंदिर, मुखेड.
माता शीतला देवीची मूर्ती नांदेड जिल्ह्यातील मुखेड तालुक्यात दशरथेश्वर मंदिराच्या बाह्यांगावर पाहावयास मिळते. ही देवी आयुर्वेद आणि आध्यात्म यांची यथायोग्य सांगड घालताना दिसून येते.
जगातील प्राचीन उपासनेत शक्ती उपासनेला अनन्यसाधारण महत्त्व दिसून येते. मानवी जीवनात स्त्रीचे असलेले महत्त्व याचे मुख्य कारण असू शकते. मातेच्या रूपात प्रजनन आणि संगोपन या दोन्ही गोष्टी स्त्रीकडे असल्यामुळे मातृ उपासना जगामध्ये सुरू झाली असावी. भारतात आणि भारताबाहेर कित्येक ठिकाणी मातृ देवतेच्या मूर्ती आढळून येतात. बलुचिस्थान, इराण, मेसोपोटेमिया, तुर्कस्तान, पॅलेस्टाईन, सीरिया, इजिप्त येथेही स्त्री अथवा मातृ देवतेच्या मूर्ती आढळून आलेले आहेत. निरनिराळ्या मूर्तीचा अभ्यास केल्यानंतर असे लक्षात येते की, शक्तीची उपासना तीन प्रकारे केल्या जाते. एक म्हणजे दिगंबर रूपा मध्ये, दुसरे रूप म्हणजे लहान मुलासह आणि तिसरा भाग म्हणजे दिग्वसना स्त्री दाखवितात पण मुखाच्या ठिकाणी कमलासारखी फुले, पशु किंवा पक्षाचे तोंड असते. नांदेड जिल्ह्यातील तालुका मुखेड येथे दशरथेश्वर मंदिर असून हे शिवमंदिर आहे. मंदिराच्या बाह्य अंगावर अप्रतिम असे शिल्पांकन असून त्यात नृत्य मग्न सप्तमातृका ही आहेत. जे की इतर कुठल्याही मंदिरावर आढळून येत नाहीत. याच बाह्य भागावरील मूर्तीत उत्तरेकडील शिल्पपटात पश्चिमाभिमुख एक मूर्ती असून ही मूर्ती शितला देवीची आहे. या मूर्तीस अनेक अभ्यासकांनी ज्येष्ठा देवी असल्याचे म्हटले आहे. मंदिराच्या एका कोपऱ्यामध्ये ही मूर्ती असून ही देवी स्थानक आणि चतुर्भुज आहे. तिने उजव्या खालील हातात सुरा, उजव्या वरील हातात केरसुनी, डाव्या वरील हातात सूप आणि डाव्या खालील हातात कपाल पत्र घेतले आहे. ही सारी लक्षणे मूर्ती शास्त्रा नुसार शितला देवीची ठरतात. परंतु काही अभ्यासक ही मूर्ती लक्ष्मीची मोठी बहीण अलक्ष्मी किंवा ज्येष्ठा असल्याचे प्रतिपादन केले आहे. देवीने डोक्यावर मुकुट घातला असून त्यावर एक असुर मुंड आहे. कानात कुंडले आणि डाव्या खांद्यावरून मुंडमाला धारण केलेली आहे. देवीची प्रतिमा नग्न असून पादपिठावर तिचे वाहन गाढव कोरण्यात आलेले आहे. स्कन्द पुराणातील शितलाष्टकानुसार सदर देवीचे वर्णन पाहता ही मूर्ती शितला देवीची मूर्ती ठरावी. या अनुषंगाने आपण काही बाबींचा मागोवा घेऊयात.
स्कन्द पुराणातील भगवान शिव रचित शितलाष्टका नुसार, "गाढवावर विराजमान, दिगंबरा, हातात झाडू अथवा कलश धरण करणारी, सुप अलंकृत मस्तकवाली, भगवती शितलास मी वंदन करतो." असे पहिल्या चरणात म्हटले आहे. सदर मूर्ती ही दिगंबरा असून हाती झाडू, सूप, कपाळ पात्र आणि सुरा आहे. स्कन्द पुराणातील वर्णना प्रमाणे हाती कलश नसून सुरा दाखवण्यात आलेला आहे. कारण ही मूर्ती संहार मूर्ती असून ती ज्वरासूर अर्थात ज्वर दैत्याचा अंत करीत आहे. बाकी सारी लक्षणे शीतला देवींचीच आहेत. त्यासोबतच गळ्यात असलेली मुंड माला ही लक्षणे ही शिवाशी संबंधित आहेत. त्याचप्रमाणे किरीट मुकुटावर ही एक मुंड कोरण्यात आलेला आहे. देवीच्या बाजूला तिचे गण वेताळ आणि पिशाच्य दाखविलेली आहेत. सदरील मूर्ती आकाराने 106 cm बाय 52 cm आहे. मूर्तीतील प्रत्येक आयुधांचा आपण प्रथमतः विचार करु. सुरा अथवा छुरीका हे संहार शास्त्र आहे. या मूर्ती मध्ये कलश नसून ती ज्वर दैत्याचा नाश करीत असल्याने सुरा दाखविलेला आहे. तर झाडू हे स्वच्छता दर्शक लक्षण आहे. तर सूप हे थंड हवा देण्यासाठी वापरण्यात येते. कपाल पात्र हे दैत्य रक्त प्राशन करण्यासाठी उपयोगात आणले जाते. ही देवी वैज्ञानिक दृष्टीने महत्वपूर्ण आहे. दाहज्वर, पीतज्वर, कांजण्या, दुर्गंधी युक्त फोडे, नेत्र विकार हे रोग दूर करणारी देवता म्हणून शितला देवी ओळखली जाते. सदरील देवी जवळ लिंबाचे डहाले ठेवली जातात कारण त्या मुळे शीतलता निर्माण होते. हाती असलेला झाडू हे स्वच्छता आणि सुरक्षितता राखण्यास प्रेरणा देणारे आहे. ऋतू परिवर्तनाणे वातावरणात अनेक बदल होतात. त्या साठी सफाई वर भर दिला गेला पाहिजे. कांजण्या झाल्यावर शरीर दाह कमी करण्यासाठी सुपाने वारे देऊन रोग्याला आराम मिळून देता येते. तर गाढव हे वाहन दाखविण्यामागे ही वैज्ञानिक करणे आहे. गाढवाची लिद रोग्याच्या अंगास लावल्याने त्याचा शरीरा वरील फोडचे डाग कमी होतात. कांजण्या झाल्यामुळे अंगावरील फोडे फोडण्याचे काम झाडूने अथवा फडा घेऊन करता येते. लिंबाची पाने ही फोडे सडू नयेत किंवा त्याचे संक्रमण होऊ नये यासाठी उपयोगी येतात. अशा रोग्यांना थंड पाणी प्यावे असे वाटत असल्याने, शितला देवीच्या हाती कलश दाखविला जातो. कांजण्या हा आजार खूप जुना असून ग्रीक मध्ये इसवी सन पूर्व बाराशे मधील एका ममीचा मृत्यू कांजण्या आजाराने झाल्याचे मानले जाते.
सदरील मूर्तीच्या गळ्यात यज्ञोपवीत प्रमाणे डाव्या खांद्यावरून रुळणारी मुंडमाला ज्यामध्ये एकूण 18 मुंडांची माळ स्पष्ट दिसून येते. ही मुंड माला पाहता शिव परिवारातील देवता शितलादेवी असल्याचेच सिद्ध होते. ज्येष्ठा ही विष्णू परिवारातील देवता असल्याने तिच्या गळ्यात मुंड माला येणे आणि कपाल पात्र धारण करणे कदापी ही शक्य नाही. पूर्वाश्रमीच्या अभ्यासकांकडे असलेली अपुरी साधने, संशोधकांची मर्यादा आणि ही शीतला माता असू शकते असे कदाचित वाटलीच नसावे. त्यामुळे या शीतला देवीच्या मूर्तीस अनावधानाने अलक्ष्मी किंवा ज्येष्ठा असे संबोधले असावे. असेही पौराणिक कथेनुसार अलक्ष्मी ही संहार रूपात दाखविली जात नाही. म्हणूनच मुखेड स्थित दशरथेश्वर मंदिरावरील मूर्ती ही ज्येष्ठा किंवा अलक्ष्मी ची नसून ती शीतला मातेची मूर्ती असल्याचे ठामपणे म्हणता येईल. माता शितलादेवी स्वच्छतेची जाणीव करून देते. देवी शीतला ही संक्रमना पासून बचाव करण्याची शिकवण देणारी वैज्ञानिक देवी आहे.
आभार - श्री Gajendra Birajdar, प्रा. डॉ. Sanjeev Doibale, श्री Aditya Phadke आणि श्री Laxmikant Sonwatkar
प्रा. डॉ. अरविंद सोनटक्के
दिगंबरराव बिंदू महाविद्यालय, भोकर. ता. भोकर जि. नांदेड
9423139676
ता. क. -
1) शीतला देवी (मरिआई, पोचम्मा, खरजू आई ई.) प्रमाणे ज्या देवता प्राचीन व पूर्व मध्ययुगीन काळात निर्माण झाल्या, त्यांचे पूजन गावा बाहेर होत असे. आज काही जणांचा असा गैरसमज आहे की, या देवता विशिष्ट जातीच्या आहेत म्हणून गावा बाहेर ठेऊन पूजन केले जाते. पण एक गोष्ट लक्षात घ्यावी लागेल की, या संक्रमन काळात आयुर्वेदतील उपचारास अनुसरून तयार झालेल्या देवता असून संक्रमन आजार गावा बाहेर असावा या हेतू मुळे बाहेर ठेवलेल्या आहेत. त्यास विशिष्ट जाती अथवा धर्माचा संबंध नाही.
2) आज संपूर्ण जग covid-19 या आजाराशी लढत आहे. आपणही मागील सहा-सात महिन्यापासून स्वतःला कोंडून घेतलेले आहे, इतरांपासून स्वतःला अलिप्त करून घेतले आहे. येत्या काही दिवसांमध्ये हे वातावरण निवळेल. परंतु समस्त मानव जातीला निसर्गाने आपला प्रकोप दाखविला आहे. यापासून जोपर्यंत बोध घेणार नाही. तोपर्यंत मानव समाज कधीही सुरक्षित असणे शक्य नाही. आमच्या पूर्वजांनी अशा अनेक संक्रमित आजारांना तोंड दिलेले आहे. त्यांच्याशी लढता लढता आयुर्वेदिक उपचार ही सांगितलेली आहेत. हे आयुर्वेदिक उपचार सर्वसामान्य माणसाला समजावेत, त्याचा सहज अर्थबोध व्हावा यासाठी संबंधित आजार आणि त्यावरील उपचार या अनुषंगाने काही देवता आणि त्यांच्या पौराणिक कथा निर्माण झाल्या आहेत. या देवता आजच्या आधुनिक युगातही आपले वैज्ञानिकत्व टिकून आहे. भारतीय पौराणिक कथेमध्ये ज्या अनेक देवी देवता आहेत. त्यातीलच एक देवी म्हणजे चामुंडा, ही प्रेतासनावर विराजमान असते. हिचे वाहन प्रेत दाखवण्या पाठीमागे कदाचित असे कारण असावे की, चामुंडा ही संहार देवी असून तिच्या भयंकर संहार सत्रा नंतर असेच संक्रमित आजार पसरत असावेत आणि असे संक्रमित आजार जेव्हा निर्माण होतात. तेव्हाचा चामुंडेच्या पायाखाली असलेल्या प्रेताप्रमाणे निपचित पडून राहावे. अन्यथा मानव समूहाला कायमचे निपचित व्हावे लागेल. हाच जणू संदेश त्या मूर्तीतून दिला गेला असावा. चामुंडा देवी प्रमाणेच संक्रमित आजाराच्या वेळी घ्यावयाची काळजी आणि सुरक्षितता तसेच स्वच्छते संदर्भाने संदेश देणारी एक देवी म्हणजे ती माता शीतला होय. या माता शीतला देवीची मूर्ती नांदेड जिल्ह्यातील मुखेड तालुक्यात दशरथेश्वर मंदिराच्या बाह्यांगावर पाहावयास मिळते. ही देवी आयुर्वेद आणि आध्यात्म यांची यथायोग्य सांगड घालताना दिसून येते.
3) मंदिर दशरथेश्वेर या नावाने ओळखले जाते. दशरथ यांचा ईश्वर म्हणजे दशरथेश्वेर असा अर्थ होतो. विशेषतः ईश्वर हा शब्द केवळ शिवा सोबतच जोडला जातो. जसे गुप्तेश्वर, केदारेश्वर, काळेश्वर, घृषणेश्वेर, सोमेश्वेर ई. मुखेडचे मंदिर एक तर दशरथ नावाच्या कोणीतरी दाणी व्यक्तीने निर्माण कार्यात सहकार्य केले असावे असेही म्हणता येईल. परंतु प्राचीन भारतीयांची मानसिकता पाहता असे घडले नसावे. माझा निष्कर्ष असा आहे की, राम पिता दशरथ यांचे दैवत / ईश्वर या अर्थाने दशरथेश्वर असे नामाभिधान मिळाले असावे.
नाग पंचमी - कला आणि सांस्कृतिक संदर्भ
भारतीय लोक धर्मामध्ये नाग पूजनाची परंपरा प्राचीन काळापासून लोकप्रिय असल्याचे दिसून येते. परिणाम स्वरूप भारताच्या विविध भागात नागाची अनेक स्वतंत्र मूर्ती पाहावयास मिळतात. भारतातील कुठल्याही शहरात अथवा लहानातील लहान खेड्यात गेल्यास नाग शिल्पे दृष्टीस पडणार नाहीत असे गाव मिळणे विरळच. एखादे मंदिर, झाड, तलावाच्या शेजारी किंवा घाटावर एका सपाट शिळेवर वळसे दार शरीर असलेल्या नागांचे शिल्प हमखास असतेच. त्यावर कधी हळद, कुंकू तर कधी शेंदूर लावलेले दिसते. काही ठिकाणी 'नाग युगल' एकमेकांना वेटोळे घातलेली शिल्पे पाहावयास मिळतात. नागांशी संबंधित असंख्य कथा या देशात अस्तित्वात आहेत. आदिवासी, अवैदिक, वैदिक समाजात वेगवेगळ्या कथांची गुंफण असून अशा कथातून भारतीय संस्कृती भक्कमपणे उभी आहे. नागाशी संबंधित असलेले अनेक शिल्पे असून सूर्य व नागाचे अनन्य संबंध सर्वश्रुत आहेतच. लोकजीवनातील नागांच्या महात्म्या मुळेच हिंदू, जैन आणि बौद्ध धर्मामध्ये ही उपदेवतेच्या रुपाने नागांना मान्यता मिळालेली दिसते. विविध धर्मातील प्रमुख देवते सोबत त्यांचा संबंध जोडलेला दिसून येतो. असे मानले जाते की नागांची उत्पत्ति श्रावण मास मधील शुक्ल पक्षातील पंचमीच्या दिवशी झालेली आहे. संपूर्ण देशात या दिवशी नागाची विधिवत पूजा होत असते. यास 'नागपंचमी' या नावाने ओळखले जाते. बंगालमध्ये नागदेवी 'मनसा' तिचे पूजनही मोठ्या उत्साहाने साजरे केली जाते. कश्मीरी ग्रंथ 'नील मत पुराण' यात विविध ठिकाणी जवळपास पाचशे वेळेस नागदेवतेचा उल्लेख आलेला आहे.
प्राचीन काळापासून भारत निसर्गपूजक देश असल्याने सूर्य पूजेचे उल्लेख ऋग्वेदात आलेली आहेत. सादृश्यधिष्टीत कल्पनेच्या जोरावर नाग आणि सूर्याच्या अनेक कथा गुंफण्यात आलेल्या आहेत. नाग हा सूर्या प्रमाणेच गायब होतो, सूर्या प्रमाणेच विद्युल्लता नागाच्या ठायी दिसते, सूर्याची दाहकता व नागाचे विष यांची तुलना, सूर्याचे तेज व नागाचा लखलखीतपणा यातील साम्यस्थळे पाहून नाग आणि सूर्य यांचे एकत्रीकरण पौराणिक कथेतून शिल्पकलेत उतरलेले दिसते. त्यासोबतच नागाचा लिंग सदृश्य आकारही त्यास लैंगिक प्रतीक बहाल करते.
नाग पूजेची सुरुवात सर्वप्रथम इजिप्तमध्ये झाली असे मत सी. एफ. ओल्डहॅम यांनी आपल्या The sun and the Serpent a contribution to the History of Serpent Worship या ग्रंथात मांडले आहे. तर ग्राफिटन एलीएट स्मिथ यांनी, 'Geographical Distribution of the Practice of Mummification.' यात संशोधनपर अभ्यास करताना सूर्य पूजा आणि सर्प पूजा यांचा जन्म ईजिप्तमध्ये झाला असल्याचे सूचित केले आहे. जगात जिथे जिथे या पूजा केल्या जातात. त्या इजिपशीयन प्रभावातून केल्या जातात असेही ते मानतात. परंतु या मताला लायन कॅप यांनी मात्र विरोध दर्शविला आहे. ते Lost continent's the Atlantis the me in History science and literature या ग्रंथात असे म्हणतात, "संस्कृतीचे एकच एक केंद्र असते व तिथून ती संस्कृती जगात प्रसरण पावते असे समजणे योग्य नाही. वास्तविक संस्कृतीचे विशेष जगात अन्यत्र पसरत असतात. म्हणून इजीप्तच्या लोकांना किंवा अन्य कोणत्याही लोकांना अशी श्रेय देणे योग्य होणार नाही."
ll भीती मधून नाग पूजा ll
जगभरातील सर्वच प्राथमिक धर्मामध्ये व आदिम समाजांमध्ये नागपूजा प्रचलित असल्याचे आढळते. भारतात सर्वत्र नागपूजा प्रचलित आहे. वेदपूर्व काळापासून भारतात नागपूजा प्रचारात होती. मोहोनजोदाडो येथील उत्खननामध्ये सुद्धा नाग मूर्ती आढळल्या आहेत. नाग विषारी असल्यामुळे मनुष्याला त्याची फार भीती वाटते. ऋग्वेदामध्ये नागाचा उल्लेख 'अहि' या शब्दाने केला असून तेथे त्याची क्रूर, घातकी व भयंकर असे वर्णन केलेली आहेत. नागाची स्तुती करून त्याला वश करून घेतले तर त्यापासून भय राहणार नाही. या कल्पनेने यजुर्वेदात नाग स्तुतीपर मंत्र आढळतात. नागपूजा नागापासून वाटणाऱ्या भयातून सुरू झाली असावी. शतपथ ब्राह्मणात नाग माता कद्रू हिला पृथ्वीचे प्रतीक समजून पूज्य मानले आहे. सर्प वेध या नावाचा अथर्ववेदाचा एक उपवेद आहे. त्यात सर्पाचे विष उतरविण्यासाठी, त्यांना वश करण्यासाठी अनेक मंत्र सांगितले आहेत. करकोटक नागाचे स्मरण करणे हे पापनाशक आहे असे मानले जाते. नागांना संतुष्ट करण्यासाठी सर्पबळी , नागबळी इत्यादी विधी गृह्यसूत्र मध्ये सांगितलेले आहेत. अशाप्रकारे नागापासून आपले संरक्षण व्हावे, या उद्देशाने प्राचीन काळापासून नागपूजा भारतात प्रचारात आली आहे.
मराठीत नागशीला म्हणून संबोधन केल्या जाणाऱ्या या शिला सारा भारत नागपूजक होता हे सिद्ध करतात. नागाला विषारी दंश असल्याने मानवजातीला त्याची प्रारंभी पासूनच भीती होती. त्याचे हे अस्त्र किती घातक आहे. याची प्रचिती सातत्याने मानवाने घेतलेली असल्याने तो या नागां पासून दूर राहात असे. भीतीतून आकर्षणाचा जन्म झाला. या सर्प योनीची भीती इतकी जबरदस्त होती की, त्यातून तो नागपूजेकडे वळला. नागाचे जमीन आणि पाण्यात ही वास्तव्य, कात टाकून द्विजत्व प्राप्त करून घेणे, त्याच्या द्विजिव्हा, हस्त - पाद - पंख विरहित शरीर, आश्चर्यकारक संभोग, अप्रतिम नागफना, त्याचा फुत्कार, त्याची भेदक नजर या सर्वांमुळे नाग मानवजातीत कुतूहल आणि आदराचा विषय बनला व त्यातूनच वेगवेगळ्या समजुती प्रचलित होऊन नागपूजा अस्तित्वात आली असावी. लोक धर्मात नागांचा उल्लेख अर्धमानव रूप आणि इच्छेनुसार कोणतेही रूप धारण करणारा अशी ही तयार झाली. लोकपरंपरेत नाग पूजनाची असलेल्या प्रबळ लोकप्रियते मुळे नाग शिव, बौद्ध आणि जैन तीर्थनकार सारख्या महत्वपूर्ण देवते सोबत संबंध जोडला गेला. ही प्रक्रिया शुंग - कुशान काळापर्यंत पूर्ण झाली होती. सृष्टीच्या संहार कार्याशी संबंधित म्हणूनच शिवाच्या गळ्यात तसेच हातातील भूषणाच्या रूपात नागाला विशिष्ट स्थान प्राप्त झाले. शिवा सोबत असलेला नाग हा काल किंवा मृत्यूचा सूचक म्हणून एक चेतावनीच्या रूपाने पाहता येते. बौद्ध परंपरेत नंद, उपनंद् आणि मुचलिंद या नागांचा उल्लेख येतो. तर जैन परंपरेत सुपार्श्वनाथ आणि पार्श्वनाथ यांचे लांछन नाग आहे. पार्श्वनाथाची यक्ष, यक्षिणी हे सुद्धा नागराज धरणेद्र आणि त्याची राणी पद्मावती यांच्या रूपाने आहेत. मथुरा, भरहुत, सांची आणि अमरावती येथे शुँग, कुषाण, सातवाहनकालीन बौद्ध स्तूपावर नागांचे प्रचुर अंकन मिळते.
नाग पूजेचा प्रारंभ नेमका कधी झाला याचा निश्चित पुरावा अद्याप सापडलेला नाही. नाग पूजा निर्मिती पाठीमागे मनोवैज्ञानिक भीती, पौराणिक साहित्यातील उल्लेख तर कुठे जनजातीय संस्कृती आणि तांत्रिक प्रतिकाच्या रूपातून तर कुठे भौगोलिक परिस्थितीच्या कारणाने भारतात नागपूजा अस्तित्वात आली असावी. लोक धर्मात ज्या स्थानीय देव- देवता असतात. त्यात नागाने आपले अस्तित्व नेहमीच टिकून ठेवले आहे. भारतीय तंत्रशास्त्रात नागाचे विशिष्ट महत्त्व असून योगातील 'कुंडलिनी' शक्तीचे प्रतीकही नागाला समजले जाते. नाग पूजेचे धागेदोरे शोधत असताना एक बाब निश्चितपणे जाणवते ती ही की, नागाची पूजा हा भारतीयांचा आत्मा असावा. उत्तरेपासून दक्षिणेपर्यंत, पूर्वेकडून पश्चिमे पर्यंत, मैदान असो की उंच पर्वते, लोक परंपरेचे आद्यरूप एक सारखीच दिसून येतात. मानवी हतबलता आणि प्राण्यांमध्ये असलेलं बल यामुळे प्राण्या मधल्या असलेल्या अज्ञात शक्तीला घाबरून त्याची पूजा अर्चना सुरू झाली असावी असे वाटते. नागपूजा कदाचित अतिप्राचीन पूजेमध्ये येत नसावी. तरी नाग पूजेचे पदचिन्ह जगातल्या सर्वच संस्कृतीत आणि कानाकोप-यात पाहायला मिळतात. आणि भारतात तर मूर्ती पूजेच्या स्वरूपात नाग पूजेचे विशेष महत्त्व आहे. भारतीय साहित्यामध्ये तीन प्रकारचे स्वरूप पाहायला मिळतात.
1. देवता गंधर्व अप्सरा हे सात्विक प्रकारात येतात.
2. यक्ष, किन्नर आणि दैत्य हे राजस प्रकारांमध्ये मोडतात
3. राक्षस, नाग, प्रेत हे तामस प्रकारांमध्ये मानले जातात.
भारतीय साहित्यात नाग हा शब्दप्रयोग देवत्व प्राप्त झालेल्या सापांसाठी वापरला असावा असे वाटते. श्रीमद् भगवद् गीतेतील दहाव्या अध्यायात 28 आणि 29 व्या श्लोका मध्ये सर्प आणि नाग असे वेगवेगळे शब्द आलेले आहेत. काही जण अनेक फणा असलेल्यांना नाग, तर एक फणा असलेला सर्प असे मांनले आहे. महाभारतातील आस्तिक उपाख्याना नुसार हे समानार्थी शब्द असावेत असे वाटते. नाग आणि सर्प यात विषधर आणि विषहीन असाही भेद असावा असे काही जणांचे म्हणणे आहे. नागवंशी हा शब्दप्रयोग त्या राजवंश यांनी केला असावा जे स्वतःचा वंश नाग माता - पित्यापासून निर्मित मानतात. किंवा जे नागपूजेशी संबंधित आहेत त्यांनाही नाग लोक म्हणत असावेत. काहीही असले तरी शेवटी भारतीय राजनेतिक इतिहासात नागांचे महत्त्वपूर्ण योगदान राहिलेले आहे.
II नाग पूजा स्वरूप II
भारतात कोब्रा सापाला नाग मानले जाते. पौराणिक कथेनुसार नाग सामान्य सर्प जाती नसली तरी आज व्यवहारिक रूपाने कोब्रालाच नाग मानले जाते. उत्तर भारतात काही ठिकाणी नाग म्हणजे पूर्वज असे मानले जातात. नागाचे रूप घेऊन ते आपल्या घर परिवाराची सुरक्षा करीत असतात. नागपंचमीच्या दिवशी घरातल्या कुठल्याही एका कोपऱ्यात वाटीभर दूध ठेवले जाते. यासोबतच काही भागात पुत्र प्राप्ती नंतर बाळाचे जावळ काढल्यानंतर घरात किंवा घराच्या बाहेर पाच सर्पाकृती काढल्या जातात. दुसऱ्या पुत्र प्राप्ति नंतरच हे प्रतीक मिटवून नवीन प्रतीके निर्माण केली जातात. राजस्थानातील काही भागात ऋषीपंचमीच्या दिवशीच नाग पूजा केली जाते. गढवाल लोक परंपरेनुसार अलकनंदा नदीच्या परिसरात नाग वास्तव्य करतात, असे मानतात. इलाहाबादच्या दारागंज मध्ये वासुकी नागाचे प्रसिद्ध मंदिर आहे. प्रतिवर्ष नागपंचमीला येथे यात्रा भरते. बिहारमधील नालंदा परिसरात अनेक नागमूर्ती आढळून आले आहेत. इथेच चतुर्मुखी नागफणा असलेली स्त्री मूर्ती मिळाली आहे. तामिळनाडूमध्ये शेष नागाची पूजा केली जाते. नागपंचमी पश्चात जन्मलेल्या मुला, मुलींची नावे नागराज किंवा नागमणी असे ठेवली जातात. काठीयावड मध्येही मंदिरे आहेत. औरंगाबाद जवळील पैठण ही क्षेत्रही नाग वंशाची संबंधित आहे. ब्राह्मण कन्या गोदावरी नदीत स्नानाला गेल्यावर शेषनाग तिच्या सौंदर्यावर मुग्ध झाला. त्यांच्या प्रेमाचा परिणाम म्हणजे राजा शालिवाहन चा जन्म होय. नाग पूजेच्या संदर्भाने बत्तीस शिराळा या गावी घडलेली घटना महाराष्ट्रात सर्वदूर प्रसिद्ध आहे. नाग पंचमीला शेतात नांगर फिरविल्याने नागाची पिल्ले दगावली. त्यामुळे क्रोधित नागिन संबंधिताच्या घरातील सर्वांनाच दंश केला. सासरी असलेल्या मुलीला ही दंश करण्यासाठी ती गेली असता. ती नाग पूजेत भक्तिभावाने मग्न असलेली दिसून आली. तेव्हा नागीनीने प्रसन्न होऊन सर्वांना जिवंत केले. नागपंचमीला महाराष्ट्रात मुलीला सासरी ठेवत नाहीत. लोकपरंपरेत असे म्हटले जाते की,
आता नागपंचमीच I
नाग आल्याची खेळायला I
मी ग भैय्याला सांगयितु I
बारा सणाला नेऊ नको I
पंचमीला र ठेवू नको I
तर
पंचमीचा सण आला डोळे माझे ओले
बांधिले ग सख्यांनी झाडाला हिंदोळे ( तारा भवाळकर, लोक संचित )
हे सारे नाग पंचमीचे महत्व अधोरेखित करतात.
ऋग्वेद, यजुर्वेद, अथर्ववेद, गृह्यसूत्र, रामायण, महाभारत, मैत्रेयी सहिता आणि पुराणात नागांचे अनेक उल्लेख आढळतात. ते ही वेगवेगळ्या समानार्थी शब्दाने. नाग पूजेच्या संदर्भाने भारतीय साहित्यात विविध विधी सांगितलेल्या आहेत. अथर्ववेदात नागाला चारी दिशांचा दिक्पाल म्हटलेले आहे. ललितविस्तार या बौद्ध ग्रंथात नागाला लोकपाल रुपात मान्यता दिलेली दिसते. नागराजा तक्षकाने स्वेच्छेने राजा परिक्षितला दंश केला नव्हता. तर ऋषीच्या शापाला पूर्ण करण्यासाठी तो दंश होता. असे नारदाने परीक्षित पुत्र जनमेंजय यास सांगून सर्पसत्र किंवा नागयज्ञ बंद करावयास लावला. त्यावेळी राजा जन्मेजय याने प्रायश्चित करण्याची तयारी दर्शविली. तेव्हा नारद मुनी ने सांगितले की, " सामूहिक रुपाने तुझ्या प्रजेने प्रतिवर्ष नागांची पूजा करावयास हवी. " असे म्हणतात की तेव्हापासून नागपंचमीला सुरुवात झाली. नाग संबंधी अनेक मिथके आपल्याला पाहावयास मिळतात. पंचतंत्राच्या कथित नागा संबंधी भरपूर लिखाण आढळून येते. नल दमयंती कथेत ही नल राजाने नागाची केलेली प्राण रक्षा आणि त्यातून नागाने केलेले सहकार्य वाचावयास मिळते.
ll नाग नगरे ll
भारताचे अतिशय प्राचीन नगर जे वायव्य सीमेवर भारताच्या प्रवेशद्वारावर वसलेले नगर म्हणजे तक्षशिला होय. जगातील विद्या अभ्यासाचं प्राचीनतम केंद्र, भारतीय लोक परंपरेनुसार ही नागराजा तक्षकाची नगरी. उत्तर प्रदेशातील अहिच्छत्र नगरी ही परंपरेने नागांची जोडल्या जाते. तिचे नावच अही म्हणजे नाग. हा तिचा नागाची संबंध सांगणारे आहे. मध्य प्रदेशात गोलियर जवळ हे शहर होते. प्राचीन पद्मावती नगरी ही पुराण प्रसिद्ध नगर. पुराणात येथील नागवंशी राज्यांची विस्तृत वर्णने आहेत. येथील नागसेन नामक राजाचा उल्लेख सम्राट हर्षवर्धन याचा राजकवी बाणभट्ट याने आपल्या हर्षचरित्रात केला आहे. नागद, नागपूर, नागापूर, नागग्राम, नागठाणा, नाग हल्ली, नागुर, नागझरी अशी नाग नामक गावे भारतात सर्व प्रांतात आहेत. हल्लीचे पद्म पवया हे ग्वालियर जवळ आहे. पूर्वी पद्मावती या नावाने प्रसिद्ध होते. येथे वृषनाग, भीम नाग, स्कंद नाग, वसू नाग, व्याग्र नाग आदी राजांची नाणी सापडली आहेत.
ll नाग वंश ll
नाग वंशाच्या उत्पत्तीच्या अनेक कथा तील ही एक कथा आहे की, कश्यप ऋषी ला कद्रू व वनिता नावाच्या पत्नी होत्या. कद्रूच्या पोटी जी संतान झाली ती नाग या नावाने प्रसिद्ध झाली. अनेक पुराणांमध्ये थोड्याफार फरकाने आली आहे. वासूकी हा नाग राजा होता त्याची राजधानी भोगावती नगरी होती. या वासुकी नंतर देवदत्त पर्यंत अनेक महान नागराजे होऊन गेले. या नागांना विविध पुराणानुसार एक, पाच किंवा सात पासून हजार पर्यंत फणा असल्याचा उल्लेख मिळतो. अनंत हा सहस्त्र फणा असलेला नाग होता. त्यावर विष्णू झोपलेला आहे असे मानतात. विष्णू त्यावर झोपला म्हणजे नागा वर विष्णूने वर्चस्व निर्माण केले असेही मानले जाते. तर नाग शिवाच्या गळ्यात असल्याने नाग लोकांचा आणि शिवाचा अनन्यसाधारण संबंध स्पष्ट होतो. नंदीवर शिव प्रसन्न झाल्यावर नंदीचा सन्मान करण्यासाठी आलेल्या नाग मंडळींची यादी वराहा पूराणात दिली आहे. नागांच्या संबंधाने सर्वात विस्तृत वर्णन माया शिल्प या ग्रंथामध्ये उपलब्ध होते. या ग्रंथात वासुकि, तक्षक, कारकोटक, पद्म, महापद्म, शंखपाल आणि कुलिक या सात प्रमुख नागांच्या लक्षणांचे वेगवेगळे उल्लेख केलेले आहेत. तक्षकाच्या मस्तकावर स्वस्तिक आणि महापद्म याच्या मस्तकावर त्रिशुल असायला हवा. अंशुमदभेदागम मध्ये चतुर्भुज आणि त्रिनेत्र नाग देवतांचे उल्लेख आढळून येतात.
धार्मिक ग्रंथानुसार, कुण्या व्यक्तीच्या कुंडलीमध्ये कालसर्प दोष असल्यास नागपंचमीच्या दिवशी भगवान शिव आणि नागदेवतेची पूजा करावी. असा उल्लेख आढळून येतो. या अर्थी नाग ही देवता सामाजिक, धार्मिक आणि ज्योतिषीय दृष्टिकोनातूनही रूढ झाली म्हणावी लागेल. हिंदू धर्म मान्यतेनुसार पृथ्वी शेषनागाच्या फण्यावर विराजमान आहे. पौराणिक मान्यतेनुसार असलेल्या प्रमुख नागांचा तपशील पुढील प्रमाणे -
शेष - अनंत या नावानेही शेष नागाचा ओळखले जाते. शेषनागाने गंधमादन पर्वतावर तपस्या केल्यानंतर ब्रह्माजीच्या वरदानाने पृथ्वीचा भार सांभाळण्याचे काम त्याच्याकडे सोपविण्यात आले. हरिवंश पुराणानुसार ब्रह्मदेवाने वासुकीला नागांचा राजा, तक्षकाला सापांचा राजा आणि शेषाला सर्वच विषदंती प्राण्यांचा राजा बनविला. यावरून शेषनागाचे महत्त्व सिद्ध होते. धार्मिक ग्रंथानुसार लक्ष्मण आणि बलराम शेषनागाचे अवतार रूप आहेत. हाच शेषनाग विष्णू चा सेवक म्हणून क्षीरसागरा मध्ये आहे. विष्णू विश्राम मुद्रेत शेष नागच्या वेटोळ्यावर झोपलेले असतात. श्रीकृष्ण जन्म समयी वासुदेव कृष्णाला यमुना पार करत असताना प्रचंड वर्षा होत होती. त्यावेळी शेषनागाने आपला फणा कृष्णा वर धरून यमुना पार करण्यास मदत केली होती.
वासुकी - हा समस्त नागांचा राजा. वासुकी हा शिवाच्या कंठास लपेटलेला असतो असेही म्हणतात. समुद्रमंथनाच्या वेळी दोरीच्या रूपाने वासुकीचा उपयोग केला गेला होता. शिवाच्या त्रिपुरांतक अवतारात शिवाने एकाच बाणात असुरांची तीन पुरे नष्ट केली होती. त्यावेळी धनुष्यबाणाची प्रत्येंचा वासुकी बनला होता. कथासरित्सागर या ग्रंथानुसार लता देशाचा राजा वासुकीच्या संबंधाने आदर भाव प्रकट करण्यासाठी प्रति वर्ष उत्सव करीत असे.
तक्षक - शृंगी ऋषीच्या शापाची अंमलबजावणी करण्यासाठी तक्षक नागाने राजा परीक्षिताला डसले होते. त्यामुळे तक्षकाचा बदला घेण्यासाठी परीक्षित पुत्र जनमेंजयने सर्प यज्ञ केला होता. तेव्हा सर्व साप यज्ञात येऊन पडू लागले. त्यावेळी आस्तिक मुनीने तक्षकाची रक्षा केली. तक्षकच शिवाच्या गळ्यात असलेला नाग आहे असे ही मानले जाते. तक्षकाचा पुत्र अश्वसेन पाताळात राहत असे. खांडव वन अग्निकांड पासून तो अर्जुनाचा विरोधी होता. त्यामुळे कुरुक्षेत्र रणभूमीवर अश्वसेन कौरवांच्या बाजूने सामील झाला होता. अथर्व वेदा नुसार तक्षक हा सर्वाधिक विष असलेला नाग होता असे म्हटले आहे. कौशिक सूत्रानुसार गृहरक्षे साठी तक्षका समोर बळी द्यावा असे म्हटले आहे. असे म्हटले जाते की, तक्षशिला येथे तक्षक संप्रदायाचा प्रभाव होता. मध्यप्रदेशात तक्षकेश्वर या नावाने इंदोर जवळ नवाली गावात एक मंदिर आहे.
करकोटक - यास शिवाचा गण असेही म्हणतात. हरिवंश पुराणात या नागाचा विशेष उल्लेख मिळतो. नल-दमयंती कथेतही करकोटक येतो. आपल्या आईच्या शापातून मुक्त होण्यासाठी महाकाल वनात शिवलिंगाची पूजा केली होती.
कालिया - याचा निवास आपल्या कुटुंबासह यमुना नदी मध्ये होता. त्यामुळे यमुने मध्ये विष पसरले होते. कृष्णाने कालियाला युद्ध करून यमुना सोडण्यास भाग पाडले.
सिंधू संस्कृतीत नागांची असलेली शिक्के, भरहुत सांची आणि अमरावती येथील नागांचे शिल्पांकन यासोबतच पुढे गुप्त काळामध्ये नाग मूर्तीचे तीन प्रकारे शिल्पांकन व्हायला सुरुवात झाली.
1) मानवाकार मूर्ती ( डोक्यावर नागफणा )
2) मानव सर्प विग्रह ( कमरेच्या वर मानव रूप )
3) पूर्ण नाग रूप.
महाराष्ट्रातील काही वंशाची नावे 'शेष' अशी आहेत. प्रख्यात शिंदे घराणे हेही नागपूजकच होते. कर्नाटक, महाराष्ट्रात अनेक शिंदे घराणे आहेत. राष्ट्रकूट नृपती गोविंद तृतीय याच्या नेसरी ताम्रपटात त्याचा सामंत नाग हस्ती याचा उल्लेख येतो. कर्नाटक राज्यातील चंद्रवल्ली, बागलकोट, भैरवमट्टी, हरिहर, मात्रहल्ली येथील शिलालेखात नागवंशी राज्यांचे अनेक उल्लेख येतात. पुणे जिल्ह्यातील जुन्नर येथे ही नागवंशीय शिंदे यांची एक शाखा राज्य करीत होती. पैठणचे सातवाहन हे नाग वंशियच राजे होते. महाराणी नागनिका ही नाग कन्याच.
ll नाग प्रतीके ll
भारतीय कलेने भावना प्रकट करण्यासाठी प्रतीकांना जन्म दिला. जसे नाग कश्यप आणि कद्रू यांचे पुत्र असल्याचे पुराणात उल्लेख आहेत. पौराणिक नाग लोकांमधील अनंत, वासुकी, शेष हे नाग मानवा अनुकूल होते. तर तक्षक, कारकोटक, कालिया हे मानव वैरी होते. नाग हा वारूळात राहतो आणि वारूळ हे भू देवतेचे प्रतीक मानले आहे. त्यामुळे भूमीच्या सृजन शक्तीशी त्याचा संबंध जोडला गेला. शिव आणि विष्णु या दोघांचाही नागाशी संबंध आहे. नागफणी धारण करणारी कालिकादेवी आहे. त्याचप्रमाणे गणेशाच्या पोटावर ही नागबंध आवळलेला असतो. कंसाच्या कैदेतून बाहेर पडल्यानंतर पावसापासून रक्षण करण्यासाठी वासुकी नागाने कृष्णावर फना छत्र धरलेले होते. बुद्धांच्या जन्मानंतर नंद व उपनंद या नागांनी स्नान घातले होते. तर ज्ञान प्राप्ती नंतर मुचलिंग नागाने त्यांच्यावर आपला संरक्षक असे फनाछत्र धरले होते. जैन तीर्थंकर पार्श्वनाथ यांचे नाग हेच अभिज्ञान चिन्ह आहे. कामठा किंवा मेघमालि हा पूर्वजन्मीचा पार्श्वनाथाचा भाऊ जो वैरी बनला होता. त्याच्या हल्ल्यापासून यक्ष धरणेद्र हा आपल्या सात फण्याचे छत्र पार्श्वनाथच्या डोक्यावर धरले असल्याचे शिल्प वेरूळ लेणीत आहे.
श्रवणबेलगोळ येथील गोमटेश्वराच्या प्रचंड मूर्ती भोवती अनेक वारुळे निर्मिले असून त्यातून नाग बाहेर येत आहेत असे शिल्पात दाखवले आहे. नाग हे योगाचे ही प्रतिक मानले जाते. त्या कारणाने शिवाची योगी राजत्व दाखविण्यासाठी नाग शिवा जवळ सातत्याने दाखविला जातो. अशी ही पौराणिक मान्यता आहे.
ll आयुध रूपातील नाग प्रतीक ll
बहुतांश देवतेसमोर नाग हे चिन्ह आयुध म्हणून दाखवण्यात येत असले तरी, प्रत्यक्षात शिवा सोबत सर्प / नाग हे लांछान कायमस्वरूपी जोडले गेलेले आहे. प्रतिमा लाक्षणिक विवरण पाहता विष्णुधर्मोत्तर पुराण, मत्स्यपुराण, मानसार, मयमत, कामिकागम, अंशुमतभेदागम, देवता मूर्ती प्रकरण, आदी शिल्प शास्त्रीय ग्रंथात शिवाच्या आयुधात कृष्णमृग, खडग, खेटक, वज्र, परशु, त्रिशूल, खट्वांग, डमरू, पाश, हस्ती चर्म, दंड, कपाल, अक्षमाला, धनुष्य, शंख, चक्र, गदा आणि सर्प किंवा नाग सांगितला आहे.
ll नाग आणि लैंगिक काम प्रतीक ll
नाग किंवा साप यांना लैंगिक भावनेचे प्रतीक मानण्यात येते. ज्यावेळी एखादा साप खांबाला वेढा देऊन बसतो तेव्हा तो खांब प्रेरित झालेले लिंग वाटतो. साप हा पुरुषवाचक शब्द म्हणून वापरला जातो. या सरपटणाऱ्या प्राण्यात लिंगाची रचना असल्यामुळे ते वासनेचे प्रतीक आहे. त्यासाठी त्याला वैशेयिक मन, संभोग इच्छा आणि संभोग इच्छा कमी होणे इत्यादीचे प्रतिनिधित्व सरपटणारे प्राणी करतात. ज्या वेळी स्त्री व पुरुष उत्तम परिस्थितीत व तंदुरुस्त शरीराने एकमेकांकडे आकर्षित होतात. त्यावेळी त्यांच्या लिंगाची व योनीची स्थिती एखाद्या वळवळणाऱ्या प्राण्या सारखी होते. ग्रीक कथेत एडम व इव्हा यांच्याजवळ साप हे प्रतीक यामुळेच दाखवण्यात येते. प्रसिद्ध मनोवैज्ञानिक सिगमंड फ्रॉइड याने सुद्धा नागाला काम प्रतीक मानले आहे. त्यांच्या मतानुसार, आदिम समाजातील स्त्रिया नागाची पूजा काम प्रतिकाच्या रूपानेच करत असत. कदाचित यामुळेच जगभरात आणि विशेषतः भारतामध्ये नागपूजा या स्त्रियाच करतात. नागाची पुत्रप्राप्तीसाठी आराधना करणे किंवा शिवा सारखा श्रेष्ठ पती मिळावा यासाठी शिवपूजन करणे या पाठीमागे ही कामभावना प्रेरित असावी असेही मानले जाते. वांझ स्त्रिया पुत्र प्राप्ती साठी नागशिळेची पूजा करतात. नागाच्या काम रूपा संदर्भाने कश्मीरी लोक कथेनुसार, सुरिनसर किंवा सुनासर ही झील अध्यात्मिक बाबतीत पवित्र मानली जाते. हा संदर्भ महाभारत काळाशी जोडला जातो. वनवासात असतांना पांडव जम्मू येथे गेले होते. ज्यावेळी नागकन्या उलुपी सोबत अर्जुनाचा विवाह झाला होता. तसेच माणिपूर राज्याची राजकन्या चित्रगंधा हिच्यासह ही अर्जुनाने विवाह केला होता. कालांतराने त्यांना बब्रुवाहन नामक वीर पुत्र जन्माला आला. अर्जुनाचे वास्तव्य तिथे अल्पकाळ असल्याने पुत्र जन्माची वार्ता अर्जुना पर्यंत पोहोचली नाही. महाभारताच्या युद्धसमाप्तीनंतर पांडवांनी अश्वमेध यज्ञ केला होता. यज्ञाचा अश्व बब्रुवाहन यांनी रोखून धरला होता. तो सोडविण्याचा प्रयत्न अर्जुनाने केला असता. युद्ध कौशल्यात अर्जुन कमी पडला. त्यामुळे अर्जुनाला मूर्च्छा आली. ही वार्ता चित्रगंधा हिला कळाली असता ती रणभूमीवर आली आणि पुत्र बब्रुवाहन यावर ती क्रोधित झाली. वडिलाला जिवंत करण्यासाठी बब्रुवाहन यांनी वैद्यची मदत घेतली. वैद्यांनी उपचार सांगितला की, पाताळ लोकातून नागमणी (वनौषधी) आणावी लागेल. त्यासाठी बब्रुवाहन याने पाताळ लोकात बाण मारला. त्या बाणाने इच्छित नागमणी आणला. त्या साठी नागकन्या उलुपीने साह्य केले. त्या नागमणीच्या सह्याने अर्जुन जागा झाला. ज्या मार्गाने बाण गेला आणि ज्या मार्गाने बाण परत आला तिथे दोन्ही बाजूने झील तयार झाली असे मानले जाते. तेव्हा पासून नवविवाहिता या झीलची तीन वेळा परीक्रमा करून नाग देवतेचा आशीर्वाद घेऊन वैवाहिक जीवनाला प्रारंभ करते.
वारूळ हे भूमीचे - भूमीच्या सृजनेंद्रीयचे याचे प्रतीक आहे. नर नाग हे पुरुषी तत्त्वाचे प्रतीक आहे. त्याची उपासना प्राधान्याने संतान दाता देव म्हणूनही होते. दक्षिणेत अनेक जमातीत वधूने व विवाहित स्त्रियांनी नाग पूजा करण्याची चाल आहे. काही ठिकाणी विवाहित स्त्रिया वारुळाची पूजा करतात. संतान प्राप्तिची अपेक्षा करणाऱ्या स्त्रिया नागाच्या अथवा नाग युगालाच्या मूर्तीची पूजा करतात. नवस फेडण्यासाठी नागमूर्ती तयार करून मंदिराच्या आवारात अथवा झाडांच्या पायथ्याशी प्रतिष्ठित करतात.
नागाचे संतान दायी सामर्थ्य भारतीय जनमानसातील अनेक धारणांमधून व्यक्त होत असते. दक्षिणेतील सर्व प्रमुख क्षेत्रपाल देव आपले नागरूपात्व सांभाळून आहेत. ग्रामीण भागातून आजही अशी दृढ समजूत आहे की, एखाद्या गर्भवती स्त्रीने साप पाहिला असता, त्याचे तत्क्षणी डोळे जातात आणि ती स्त्री प्रसूत झाल्यावर तिच्या नान्ही घराचा गंध अनुभवल्यावर तो नाग पुन्हा डोळस होतो. ती गरोदर असताना त्या स्त्रीचा आणि पुरुषाचा संबंध येऊ नये किंवा समागम घडू नये, असा निषेध त्यात अभिप्रेत असावा. सर्व पुरुष नागाचे प्रतिनिधी आहेत आणि नाग हे पुरुषी तत्त्वाचे प्रतीक आहे. म्हणून वारुळाची पूजा भूमीच्या सृजनेंद्रीयचे प्रतीक म्हणून केली जाते. वारूळास पृथ्वीची योनी म्हणतात. योनी रूपिनी भुदेवी आहे. योनी प्रतीक म्हणून नैसर्गिक वारूळची उपासना अति प्राचीन काळापासून आजपर्यंत दक्षिण भारतात तरी अखंड प्रचलित आहे. वारूळ ही फारच नाजूक असल्यामुळे वारूळ सादृश्य घडीव शीला मूर्तीचे प्रचलन क्वचित कोठे असल्याचा पुरावा उपलब्ध आहे. वारुळाच्या शीला रूप प्रतिकृती नंतर नाभी पर्यंतच्या योनी मूर्ती घडविल्या जाऊ लागल्या. तसेच प्रसवा बरोबरच पोषणाचा ही मातृत्वाशी संबंध असल्यामुळे योनि प्रमाणेच स्थानांना उठाव देणाऱ्या स्कंदा पर्यंतच्या मूर्तीची निर्मिती होत गेली. भू देवीच्या सर्जक आणि पोषक इंद्रियांच्या मूर्तीचा हा वारूळ ते योनी - स्तन - युक्त मूर्ती पर्यंतचा क्रमविकास श्री रा. चि. ढेरे यांनी सिद्ध केला आहे.
II काम शास्त्रीय ग्रंथानुसार नाग II
कल्याणमल्ल, कोक्कोक, दीक्षित श्यामराज, श्री प्रोढदेवराज, मथुरा प्रसाद दीक्षित यांनी नायिकेच्या माणस प्रकृतीचा ही उल्लेख केलेला आहे. देव सत्वा, यक्ष सत्वा, मनुष्य सत्वा, पिशाच्च सत्वा, नाग सत्वा, काक सत्वा, वानर सत्वा आणि खर सत्वा असे प्रकार सांगण्यात आलेले आहेत. सत्व या शब्दाचा अर्थ शील असा होतो. अर्थात नायिकेच्या चारित्र्य आणि वागणुकीवरून हे सत्वाचे प्रकार दिलेले आहेत. त्यानुसार जी नेहमी एखादी घटना किंवा काम विसरते, विसराळू स्वभावाची जी नेहमी व्याकुल, घाबरलेली असते, सापाप्रमाणे दीर्घ श्वास घेणारी, नेहमी निद्राधीन राहणारी, नेहमी जांभळी देणारी ती नाग सत्वा जाणावी. असे म्हंटले आहे.
वरील विवेचनावरून असे म्हणता येईल की,
1) सर्वच प्राचीन मानवी सभ्यतेत नागा विषयी भीतीतून आदरभाव निर्माण झाला.
2) नाग सादृश्यधिष्टीत कल्पनेच्या जोरावर सूर्या सोबत संबंध जोडून कथा निर्मिती केल्या गेल्या.
3) नाग हे अत्यंत जहाल विष बाळगून असल्यामुळे आमचाही वंश नागसम आहे. हे दाखविण्यासाठी कुळवंश प्रतिकाच्या रूपाने नाग हे 'कुलचिन्ह' म्हणून ज्या जमातींनी किंवा राज वंशानी स्वीकारले त्यास नागलोक या नावाने ओळखण्यात येते.
4) नागाची शरीर रचना ही पुरुष लिंगाप्रमाणे असल्यामुळे आणि वारूळ स्त्री लिंग अथवा भूमिचे / सृजनाचे प्रतीक म्हणून स्वीकारले गेले असावे.
5) दक्षिणेतील अनेक क्षेत्रपाल देवता आपले नागरूप प्रकट करताना दिसतात.
6) आशीर्वाद देत असताना हाताची मुद्रा ही पाच फडा असलेल्या शेषनागाची मुद्रा मानली जाते. यज्ञोपवीतातील एका सूत्राचे नाव नाग तंतू असे आहे.
( संदर्भ ग्रंथ कर्त्यांचे आभार, फोटो स्त्रोत :- श्री प्रवीण योगी यांच्या कडून मिळाले.)
डॉ. अरविंद सोनटक्के,
दिगंबरराव बिंदू महाविद्यालय, भोकर. जि. नांदेड.
(9423139676)
© पोस्ट शेअर करा पण माझ्या नावासह © 😊🙏
🐍 नाग पंचमीच्या सोनटक्के परिवाराकडून आपणास हार्दिक हार्दिक शुभेच्छा 🐍
धर्मापुरीच्या केदारेश्वर मंदिरावरील मोहिनी की काली : एक शोध
भारतीय मूर्ती कलेचा इतिहास समजून घेण्यासाठी पुराणाचा अभ्यास असणे अनिवार्य आहे. कारण देवी-देवतांच्या नाना विधिरूपे पुराणानीच बहाल केलेली आहेत. त्यातीलच काही रुपे धर्मापुरीच्या केदारेश्वर मंदिरावर पाहावयास मिळतात. बीड जिल्ह्यातील परळी वैजनाथ तालुक्यातील धर्मापुरीच्या मंदिरावर असलेल्या एका देवी शिल्पास मोहिनीचे शिल्प असे अभ्यासकांचे म्हणणे असून हे मोहिनीचे शिल्प नसून कालीचे शिल्प आहे.
गावाजवळच एका खडकाळ शेतात चालुक्यकालीन कलेचा अप्रतिम अविष्कार असलेले केदारेश्वर मंदिर आहे. हे मंदिर म्हणजे धर्मापुरीतील जतन केलेले असे एकमेव मंदिर होय. नुकतेच या मंदिराचा पुरातत्व विभागाकडून जीर्णोद्धार करण्यात आला. अर्ध मंडप, मंडप, अंतराळ, गर्भगृह अशी मंदिराची रचना आहे. हे केदारेश्वर मंदिर चालुक्य राजा विक्रमादित्य सहावा याने बांधल्याची नोंद आढळून येते. मंदिर पश्चिमाभिमुख असून मंदिराच्या जंघा भागावर आकाराने पुष्ट असलेल्या शैव-वैष्णव तसेच शक्तांची मिळून एकूण 68 मूर्ती कोरलेल्या आहेत. त्यातील मंदिराच्या पश्चिम पूर्व कोपऱ्यात अर्थात अग्नेय दिशेला पूर्वेकडे तोंड करून दक्षिण दिशेकडून अनुक्रमे आठव्या क्रमांकाची सुमारे 102 सेंटिमीटर उंच आणि 46 सेंटिमीटर रुंद अशी कालीची संहार मूर्ती आहे. या मूर्तीस अभ्यासकांनी भस्मासुराला मारणारी मोहिनी आहे असे म्हटले असले तरी, मूळच्या मोहिनी आणि भस्मासुराच्या कथेशी ही कथा जुळत नाही. मूळच्या मोहिनी रूपातील विष्णूची कथा अशी आहे की, भस्मासुराला मारण्यासाठी विष्णूने अतिशय आकर्षक असे स्त्री रूप घेतले होते. भस्मासुरास शिवाने दिलेले वरदान असे होते की, " तो ज्याच्या मस्तकावर हात ठेवील तो भस्म होऊन जाईल." मिळालेल्या वरदानाच्या प्रचीती साठी भस्मासूर शिवाच्याच मस्तकावर हात ठेवण्यासाठी मागे लागला. तेव्हा शिवाचे रक्षण करण्यासाठी विष्णूने मोहिनी रूप घेऊन भस्मासुरा समोर आली असता; तिच्या अप्रतिम सौंदर्यावर भाळून भस्मासुराने मोहिनी समोर विवाहाचा प्रस्ताव ठेवला. त्या वेळी "मी एक नर्तकी असून मला नृत्यात प्रवीण असलेल्या व्यक्ती सोबतच लग्न करावयाचे आहे." असे मोहिनीने म्हटल्यामुळे भस्मासुराने मोहिनीस नृत्य शिकवावे अशी विनंती केली. त्याच्या विनंतीस होकार देत मोहिनी भस्मासुरास नृत्य शिकवू लागली. अशा पद्धतीने मोहिनी रूपातील श्रीविष्णूने भस्मासुरास नृत्यास भाग पाडले. नृत्याच्या विविध मुद्रेत मोहिनीने (विष्णूने) स्वतःच्या मस्तकावर अचानक हात ठेवला व मिळालेल्या वरदानास विसरून तसेच कृत्य भस्मासुरा कडून झाले आणि स्वतःच्याच डोक्यावर हात ठेवताच भस्मासुर जागीच भस्म झाला. हे विश्लेषण पाहता प्रस्तुत मूर्ती मोहिनीची असावी अशी यत्किंचित ही शक्यता नाही. केदारेश्वर मंदिरावरील सदरील मूर्तीचे अवलोकन केले असता. श्यामा रहस्य या ग्रंथातील कालिच्या वर्णनाप्रमाणे चतुर्भुज, मुंड माला विभूषित, घोर दंतावली, पुष्ट आणि उन्नत स्तना असलेली, असे वर्णन सांगितलेले आहे. प्रस्तुत शिल्पात स्त्रीरूपी देवता राक्षसाच्या मुखवरील त्वचा सोलून काढीत असल्याने ती मोहिनी रूप होऊ शकत नाही. तर या शिल्पातील स्त्री देवता अलिढासनातील स्थानक मूर्तीत चतुर्भुज असून प्रदक्षणा क्रमाने उजवा हात चेहऱ्यावरील कातडी सोलून काढीत आहे. तर उजव्या वरच्या हातात त्रिशूल किंवा खट्वांग प्रमाणे तुटलेले शस्त्र दिसते आहे. डाव्या वरच्या हाताने राक्षसाने मारलेल्या खडगास वरच्यावर रोखून धरलेला असून खालच्या डाव्या हाताने राक्षसाचे केस गच्च धरलेले आहेत. देवीची शरीररचना प्रमाणबद्ध सुंदर असली तरी, बाहेर आलेले सुळे दात, त्रिशूल किंवा खट्वांग, शरीरावर रेंगाळणारी मुंड माला या लक्षणांवरून ती काली असून मोहिनी ठरत नाही. वामन पुराणात रूरू नावाच्या असुराने काली वर आक्रमण केले असता तिने आपल्या खट्वांगाने त्याला मारले व त्या असुराचे कानापासून पायापर्यंतचे कातडे सोलून काढून त्या कातड्याच्या वादी बनविल्या आणि त्याने आपल्या जटा बांधल्या. असा उल्लेख आलेला आहे. या कथानकावरून ही मूर्ती कालीची आहे, हे स्पष्ट होते. वामन पुराणातील या कथानकाप्रमाणे मूर्तीतील देवीने डाव्या हाताने राक्षसाचे किंवा दैत्याचे केस धरून उजव्या हाताने त्याच्या चेहऱ्यावरील त्वचा पूर्णपणे सोलून काढलेली आहे. त्यामुळे राक्षसाची कवटी दिसत असून डोळे कवटीच्या खोबणीतून बाहेर आलेली आहेत. तसेच नाकाचे हाड ही स्पष्ट दिसते आहे. ओढून काढलेली त्वचा गळ्याजवळ एकत्र जमलेली असून त्वचेचा नाकावरील भाग, डोळ्यांची बुबुळे असलेली पोकळ जागा तसेच ओठ ही कोरलेले दिसतात.
शिल्पकलेच्या दृष्टीने प्रस्तुत शिल्प निर्माण करणे ही कलाकाराच्या कलेची कसोटी होती असे म्हणावे लागेल. कारण या शिल्पात चेहऱ्यावरून सोलून काढली त्वचा दाखविण्याचे कसब सामान्य शिल्पीचे नक्कीच नाही. धर्मापुरीच्या केदारेश्वर मंदिरास भेट दिल्यास नक्कीच हे शिल्प आपले लक्ष वेधून घेणारे असणार आहे हे निश्चित. नेहमी देवतेच्या रूपा वरून राक्षस शोधत असतो पण इथे राक्षसा वरून देवतेची ओळख पटली हे विशेष आहे. रुरू सिद्ध झाल्या वरच काली पूर्ण झाली असे म्हणावे लागेल.
टीप :- या शिल्पा संबंधी मराठवाडा इतिहास परिषदेच्या 40 व्या अंकात शोधनिबंध सादर करण्यात आला आहे. अभ्यासूंनी मूळ शोधनिबंध पहावा.
मिथक शिल्पे – किन्नर किन्नरी
>> आशुतोष बापट
ग्रीक पुराणकथांमधील पंखधारी घोडा अर्थात पेगॅससबद्दल काही कथा आपण बघितल्या. याच पंखधारी घोडय़ाबद्दल अजून एक बाब म्हणजे कॉरिन्थच्या नाण्यांवर पंख असलेल्या पेगॅससचा छाप दिसून येतो. इ.स.पूर्व 4 थ्या शतकातील कॉरिन्थच्या चांदीच्या नाण्यावर पंखधारी पेगॅसस कोरलेला आहे. त्याच कालखंडात निर्माण झालेल्या लाम्पसॅकसच्या नाण्यांच्या मागच्या बाजूवरसुद्धा पंखधारी अश्वाचे शिल्प बघायला मिळते. म्हणजेच कलेमध्ये या पंखधारी घोडय़ाचे स्थान जसे शिल्पांमध्ये आहे तसेच ते नाण्यांवरसुद्धा दिसून येते. पंखधारी घोडय़ासारखा अजून एक चमत्कारिक प्राणी आपल्याला दिसतो तो म्हणजे पंखधारी हत्ती.
अमरावती, सांची, नागार्जुनकोंडा इथल्या उडणाऱया हत्तींची शिल्पे बुद्धजन्माच्या चमत्काराची घटना दाखवतात. या शिल्पांमधे जरी हत्तींना पंख दाखवले नसले तरीसुद्धा त्यांच्या शिल्पांवरून ते आकाशात विहार करताहेत हे स्पष्टपणे समजून येते. अर्थात हत्तींना पंख दाखवणे हे काही हिंदुस्थानी कलाकारांना अगम्य नव्हते. अमरावती इथल्या शिल्पांमधून आपल्याला पंख असलेले हत्ती शिल्पांकित केलेले बघायला मिळतात.
पुणे परिसरातील योग-साधना व संबंधित शिल्पे
आधुनिक जीवनशैलीमुळे आरोग्यसंबंधीच्या निर्माण झालेल्या अनेक समस्या तसेच दिवसेंदिवस वाढत चाललेला ताण-तणाव, यांवरती उपाय म्हणून योगसाधनेकडे जग मोठया आशेने पाहत आहे. दैनंदिन जीवनात आरोग्य विषयीचे महत्त्व आपल्या पूर्वजांनी फार पूर्वीपासूनच ओळखले होते. यासाठी त्यांनी योगसाधनेला आपलेसे केले. अनेक ऋषी-मुनींनी योगविद्येच्या बळावर आपले व इतरांचे जीवन आरोग्यदायी बनविण्याचा प्रयत्न केला. जागो-जागी असणारे सांप्रदायिक मठ तसेच गुहा-कंदरांमध्ये ही साधना चालत असे. वरचेवर यात नवनवीन प्रयोग झाल्याने ही विद्या भरभराटीस आली. कित्येक प्राचीन मंदिरांवरती शिल्पकलेच्या रुपात आपल्याला याचे पुरावे मिळतात.
| कुंडलिनी योग संबंधीचे शिल्प, पिंपरी-दुमाला |
| द्विपादशिरासन/पाशिनी मुद्रा, भुलेश्वर मंदिर |
| पाद-पश्चिमोत्तानासन, ब्रह्मनाथ मंदिर, पारुंडे |
मिथक शिल्पे – किन्नर किन्नरी
>> आशुतोष बापट
ग्रीक पुराणकथांमधील पंखधारी घोडा अर्थात पेगॅससबद्दल काही कथा आपण बघितल्या. याच पंखधारी घोडय़ाबद्दल अजून एक बाब म्हणजे कॉरिन्थच्या नाण्यांवर पंख असलेल्या पेगॅससचा छाप दिसून येतो. इ.स.पूर्व 4 थ्या शतकातील कॉरिन्थच्या चांदीच्या नाण्यावर पंखधारी पेगॅसस कोरलेला आहे. त्याच कालखंडात निर्माण झालेल्या लाम्पसॅकसच्या नाण्यांच्या मागच्या बाजूवरसुद्धा पंखधारी अश्वाचे शिल्प बघायला मिळते. म्हणजेच कलेमध्ये या पंखधारी घोडय़ाचे स्थान जसे शिल्पांमध्ये आहे तसेच ते नाण्यांवरसुद्धा दिसून येते. पंखधारी घोडय़ासारखा अजून एक चमत्कारिक प्राणी आपल्याला दिसतो तो म्हणजे पंखधारी हत्ती.
अमरावती, सांची, नागार्जुनकोंडा इथल्या उडणाऱया हत्तींची शिल्पे बुद्धजन्माच्या चमत्काराची घटना दाखवतात. या शिल्पांमधे जरी हत्तींना पंख दाखवले नसले तरीसुद्धा त्यांच्या शिल्पांवरून ते आकाशात विहार करताहेत हे स्पष्टपणे समजून येते. अर्थात हत्तींना पंख दाखवणे हे काही हिंदुस्थानी कलाकारांना अगम्य नव्हते. अमरावती इथल्या शिल्पांमधून आपल्याला पंख असलेले हत्ती शिल्पांकित केलेले बघायला मिळतात.
पंखधारी हत्तींनंतर एक महत्त्वाचा प्रकार आपल्याला बघायला मिळतो तो म्हणजे किन्नर आणि किन्नरी हा होय. त्यांच्याबद्दल खूप रंजक अशा कथा प्रसिद्ध आहेत.
किन्नर आणि किन्नरी
किं-नर? म्हणजे हे नर आहेत का ? किन्नर या नावातच हा प्रश्न विचारला आहे. माणसासारखे दिसणारे, पण मनुष्यप्राणी नाहीत असे हे जीव आहेत. अर्धा माणूस, अर्धा घोडा आणि पक्षी असे स्वरूप असणारे हे किन्नर. हे किन्नर यक्ष, गंधर्व या श्रेणीत मोडतात. प्राचीन हिंदुस्थानी कलेमध्ये किन्नरांचे आकर्षक शिल्पांकन केले आहे. तिथे त्यांचे दर्शन अनेकदा होते. सांची, भारहूत, अमरावती, नागार्जुनकोंडा, मथुरा इथल्या शिल्पांमधून आपल्याला बऱयाच ठिकाणी किन्नर शिल्पे दिसून येतात. अजिंठा चित्रकलेतही किन्नरांचे चित्रांकन केलेले आहे. बऱयाचदा हे किन्नर, स्तूपाच्या भोवती कोरलेले दिसतात. इथे ते स्तूपाची पूजा करताना दाखवलेले असतात. हातात फुलांचा हार किंवा हातात तबक आणि त्या तबकात फुले घेऊन ते स्तूपाच्या पूजेला जाताना दाखवतात. ते बोधीवृक्ष, धर्मपा यांच्या समवेत दिसतात, तर काही ठिकाणी ते हातात तंतुवाद्य घेतलेले दिसतात. प्राचीन हिंदुस्थानी कलेत किन्नरांचे शिल्पांकन विपुल प्रमाणात बघायला मिळते.
किन्नरींची शिल्पे ही किन्नरांच्या इतकी विपुलतेने दिसत नाहीत. किन्नरी ही सर्वसाधारणपणे किन्नरासोबतच दाखवलेली असते. अजिंठय़ाच्या चित्रकलेत किन्नर-किन्नरींची चित्रे फार सुरेख चितारलेली आहेत. अजिंठय़ाच्या भित्तीचित्रात हातात झांजा घेतलेल्या किन्नरीचे चित्र फारच लक्षवेधक आहे. विष्णुधर्मोत्तर पुराणात किन्नराचे वर्णन अर्धा माणूस आणि अर्धा घोडा असे आलेले आहे, परंतु बौद्ध धर्मीयांच्या समजुतीनुसार किन्नर म्हणजे अर्धा माणूस आणि अर्धा पक्षी होय. बोधगयेला एका यक्षाचे शिल्प आहे. तिथे त्या यक्षाचे डोके घोडय़ाचे आहे. वस्तुत ही एक किन्नरी असून जातकातील चित्रकथेनुसार तिला गंधर्व मानले गेले आहे. जातकातील नोंदीनुसार किन्नर हे परी वर्गातले असून ते नेहमी जोडीने जाताना दाखवतात. त्यातून त्यांचे एकमेकांप्रती प्रेम आणि निष्ठा दाखवली जाते. चंद किन्नर जातकात अशाच एकनिष्ठ प्रेमाचा दाखला दिलेला आहे. किन्नर हे दीर्घायुष्यासाठीदेखील प्रसिद्ध आहेत. जातकांमधून किन्नरांचे वर्णन करताना त्यांना निष्पाप आणि निरुपद्रवी दाखवतात. ते निरागसपणे पक्ष्यांसारखे उडय़ा मारतात, संगीत आणि गाण्याचे त्यांना वेड असते. किन्नरी झांजा वाजवते तर किन्नर बासरी वाजवतात. जातक 481 मध्ये या निरागस जिवांबद्दल अजून एक वर्णन आले आहे. त्यानुसार किन्नरांना पकडले जाते आणि पिंजऱयात बंदिस्त करून नजराणा म्हणून राजाला सादर केले जाते, तर जातक 504 मधे एका किन्नराचे आत्मचरित्रच वाचायला मिळते. महाकवी कालिदास आपल्या ‘कुमारसंभव’ या नाटकात किन्नरांचे वर्णन करताना म्हणतो की, यांचा अधिवास हा हिमालयात असतो, तर जातक 485 मध्ये असे सांगितले आहे की हे किन्नर पंडारक, त्रिकुटक, मल्लनगिरी, चंदपबट आणि गंधमादन या पर्वतांवरसुद्धा राहतात.
किन्नरांबद्दल अजून काही गमतीशीर गोष्टी आहेत. त्या पुढच्या भागात बघू या.
asप्ल्tदेप्.trाक्s@gस्aग्त्.म्दस्
मिथक शिल्पे – आकाशगामी
>> आशुतोष बापट
मागील लेखात आपण आकाशगामी म्हणजेच व्योमचरिन् या वर्गातले प्राणी बघायला सुरुवात केली होती. या प्रकारात एकापेक्षा एक आकर्षक आणि विस्मयकारक प्राणी भरलेले आहेत. त्यातल्या ग्रिफिनपर्यंत आपण येऊन पोचलो होतो. भारतीय कलेच्या बाबतीत बोलायचं झालं तर ग्रिफिन हे नंतरच्या काळात दिसणाऱया श्येन, गरुड आणि शुक-व्याल या संकल्पनेचे प्राथमिक रूप म्हणता येईल. भारतीय कलेत दिसणाऱया ग्रिफिनच्या शिल्पासारखेच ग्रिफिनचे एक शिल्प मिलेटस इथल्या ग्रीक देवता अपोलोच्या मंदिरातील एका स्तंभावर कोरलेले दिसते. त्याशिवाय इ.स.पूर्व 4-5 व्या शतकातील तिओस आणि थ्रेसच्या नाण्यांवरसुद्धा ग्रिफिनचे शिल्प आढळून येते.
ग्रिफिनबद्दल काही सुरस कथा प्रसिद्ध आहेत. ग्रिफिन हे जगाच्या उत्तर टोकावर हायपरबोरीयनचे शेजारी म्हणून वास्तव्याला असतात. ते सोन्याच्या खजिन्याचे राखणदार असतात. या खजिन्यावर एकच डोळा असलेल्या अरिमास्पियन्सचे लक्ष असते. ते हा खजिना चोरण्याच्या प्रयत्नात असतात. ग्रिफिन, हायपरबोरीयन आणि अपोलो यांचेसुद्धा सुरेख संबंध या कथांमधून येतात. अपोलो या ग्रीकांच्या देवतेने हायपरबोरीयनसमवेत काही काळ घालवला होता. त्यामुळे हायपरबोरीयन्स हे पवित्र समजले गेले. कालांतराने अपोलो आणि हेलीयस या सूर्यदेवतांचे एकत्रीकरण झाले किंवा अपोलोलाच पुढे हेलीयस असे संबोधले जाऊ लागले तेव्हा हे ग्रिफिन हेलीयसचे सारथी झाले होते. हेलीयसचा रथ हे ग्रिफिन आकाशमार्गे ओढून नेतात असे वर्णन अनेक कथांमधून येते.
पंखधारी हरीण किंवा काळवीट
पंखधारी हरीण किंवा काळविटाची दोन शिल्पे आपल्याला सांचीला दिसतात. सांची स्तुपाच्या उत्तर तोरणावर पाठीला पाठ लावून बसलेल्या या दोन पंखधारी हरणांचे शिल्प आहे. टोकदार शिंगे असलेल्या या हरणांनी आपले पंख उंचावलेले आहेत. अतिशय मोहक आणि आकर्षक असे हे शिल्प आहे. यांनाच पुढे हरीण-व्याल म्हणून संबोधले जाऊ लागले. याच तोरणाच्या मागच्या बाजूवर पंखधारी काळविटाचे एकमेव शिल्प आहे. यालासुद्धा हरीण-व्याल असेच म्हणतात. सांचीसारखेच अमरावती आणि मथुरा इथे आपल्याला पंखधारी हरीण (हरीण-व्याल) शिल्पांकित केलेले दिसून येतात.
पंखधारी घोडा
उडणारे घोडे किंवा पंख असलेल्या घोडय़ाचे उल्लेख भारतीय आणि परकीय साहित्यातून जरी विपुल प्रमाणात दिसत असले, तरी त्या मानाने त्यांचे कलेमध्ये शिल्पांकन फारच थोडे दिसते. अशी शिल्पे दुर्मीळच म्हणायला हवीत. मात्र एक सुंदर शिल्प आपल्याला सांची स्तुपाच्या कठडय़ावर दिसते आणि दुसरे शिल्प अमरावती कलेमधे दिसून येते. हिंदू पौराणिक कथांमधून दिसणारा ‘उच्चैश्रवा’ नावाचा घोडा, हा या पंखधारी घोडय़ाचे मूळ रूप असण्याची शक्यता आहे.
बौद्ध साहित्यात बर्याच जातक कथा आहेत. या कथांमधून गौतम बुद्धाचे पूर्वीचे जन्म आणि त्यात त्याने समाजासाठी केलेले योगदान सांगितलेले असते. त्या जातक कथांच्या विषयानुसार त्यांना विविध नावे दिलेली आहेत. अशाच एका ‘वलहंस जातका’त या पंखधारी घोडय़ाचा उल्लेख येतो. या घोडय़ाचा संदर्भ बौद्ध संकल्पनेतील एका रत्नाशी आहे. तो असा की, बौद्ध संकल्पनेनुसार चक्रवर्तीपदाची काही लक्षणे आहेत. ज्यानुसार चक्रवर्ती हा सप्त रत्नांनी सुशोभित केलेला असतो. म्हणजेच त्याच्या बाजूने सात रत्ने दाखवलेली असतात. त्यातील एक रत्न म्हणजे वलह श्रेणीतला एक घोडा असतो. आणि म्हणून हा घोडा या जातककथेत दिसून येतो. या जातककथेनुसार हा घोडा, ‘विदुरपंडित’ जातकातल्या पुणक यक्षासारखा आकाशात उडू शकतो. बहुदा या कथांमधून आलेल्या उडणाऱया घोडय़ांच्या कल्पनेवरून, शिल्पकारांना प्रेरणा मिळाली असावी आणि म्हणून त्यांनी पुढे अशा उडणाऱया घोडय़ांची शिल्पे निर्माण केली असावीत.
ग्रीक पुराणकथांमधूनही उडणाऱया घोडय़ाचे उल्लेख येतात. तिथे पेगॅसस नावाच्या पंख असलेल्या घोडय़ाची कथा आहे. पॉसिडॉनचा मुलगा असलेला हा पेगॅसस. या पेगॅससचा एका पाण्याच्या झऱयाशी संबंध आलेला आहे. त्याच्या जन्माची कथा मोठी रंजक आहे. त्याच्या आईचे डोके पर्सियसने कापले. त्यानंतर तिच्या रक्तबंबाळ शरीरातून हा पेगॅसस जोरदार उसळी मारून बाहेर पडला. तो फारच उत्तेजित झालेला होता. जन्माला आल्यावर त्याने आकाशात उंच झेप घेतली. तो पहिल्यांदा जिथे विश्रांतीसाठी थांबला ते ठिकाण म्हणजे कॉरीन्थचे एक्रोपोलीस होते. नंतर तो जेव्हा पेरेनाच्या कारंज्यापाशी पाणी पिण्यासाठी थांबला तेव्हा अथेन आणि पॉसिडॉनच्या मर्जीने बेलेरोफोन याने पेगॅससला शांत केले आणि तो त्याच्यावर स्वार झाला. याच पेगॅससवर आरूढ होऊन बेलेरोफोनने युद्धात मोठमोठे विजय मिळवले. चिमेरावर मिळवलेला विजय हा त्यातल्याच एक होय. पुढे पेगॅससने त्याच्या बेलेरोफोन या स्वाराला धुडकावून लावले आणि तो उंच उंच उडत पार स्वर्गात गेला. तिथे त्याने झ्यूसबरोबर वास्तव्य केले. वीज आणि ढगांचा गडगडाट आणण्याच्या कामात त्याने झ्यूसला मोलाची मदत केली. काही लेखकांनी पेगॅससला इरॉस किंवा म्युझेसचा अश्व म्हणून संबोधले आहे. पेगॅससने ज्या ठिकाणी हेलीकॉनला आपल्या खुराने मारले, त्या ठिकाणी पाण्याचा झरा उत्पन्न झाला. ज्याला ‘अश्वाचा झरा’ असे नाव पडले. ट्रोजनजवळ असलेला हिप्पोक्रीन नावाचा झरा आणि अक्रोकोरीन्थस जवळचा पिरेन झरा यांच्या उत्पत्तीची कथासुद्धा अशीच सांगितली जाते.
ashutosh.treks@gmail.com
मिथकशिल्पांचे प्रकार
>> आशुतोष बापट
आपण बघितले की, के. कृष्णमूर्तींनी त्यांच्या पुस्तकात हे इहामृग, व्याल किंवा जे काल्पनिक प्राणी वर्णन करून सांगितले आहेत, ते साधारणत तीन प्रकारांत विभागले आहेत. आकाशगामी प्राणी (व्योमचरिन्), जमिनीवरचे प्राणी (भूचरिन्) आणि पाण्यातले प्राणी (जलचरिन्). काल्पनिक प्राणी चित्रित किंवा शिल्पांकित करताना त्या प्राण्यांना दाखवलेल्या विशिष्ट अवयवांवरून त्यांचे वर्गीकरण तीन प्रकारांत केलेले आहे. मूलत तो प्राणी कोण आणि त्याला कुठले अवयव जोडले आहेत याचा विचार करून हे प्रकार ढोबळमानाने ठरवले गेले आहेत. प्राणी कुठल्या गटात बसतो वगैरे तांत्रिक बाबी सोडल्या जरी असल्या तरी यातली नाटय़मयता, प्राण्यांचे नवीन रूप, काही प्राण्यांचे परकीय कलेशी असलेले साधर्म्य यांचा ऊहापोह के. कृष्णमूर्तींनी केलेला आहे. या तीन वर्गीकरणांतला पहिला प्रकार आहे तो आकाशात उडणारे प्राणी. त्यांना ‘व्योमचरिन्’ असे म्हटले आहे.
आकाशगामी (व्योमचरिन्) – आकाशगामी म्हटले की, साहजिकच उडणे ही क्रिया अपेक्षित आहे आणि उडणे या क्रियेशी जोडला गेलेला अवयव म्हणजे पंख. त्यामुळे प्राणी जरी संमिश्र असला तरी त्याला पंख दाखवले की, तो उडणारा आहे हे लगेच समजून येते. ‘आकाशगामी’ या नावातच स्पष्ट होतं की, असे संयुक्त, काल्पनिक प्राणी (व्याल) ज्यांना पंख दाखवलेले असतील, त्यामुळे या प्रकारात जे प्राणी समाविष्ट केले आहेत त्यांचे प्रकार पुढीलप्रमाणे बघता येतील. यामध्ये पंखधारी सिंह, पंखधारी आणि शिंग असलेले सिंह, ग्रिफिन म्हणजे पंखधारी गरुडरूपी सिंह, पंखधारी हरीण, काळवीट, पंखधारी घोडे, पंखधारी हत्ती, किन्नर आणि किन्नरी, पंखधारी आणि हत्तीमुखी बैल म्हणजे पंखधारी गरुडरूपी सिंह, पंखधारी पाणमांजर, पंखधारी बकरी, सिंहमुखी कोंबडा, पंखधारी आणि सिंहाचे शरीर असलेले पुरुष आणि स्त्राr, पाच फणे असलेला नाग आणि गरुड, पक्ष्याचे शरीर असलेली स्त्राr. एवढय़ा विविधतेचे प्राणी आपल्याला ‘आकाशगामी’ म्हणजे ‘व्योमचरिन्’ या श्रेणीमध्ये सापडतात. या प्राण्यांचे शिल्पांकन किंवा चित्रांकन कुठे केलेले आहे तेसुद्धा बघू या.
हिंदुस्थानी साहित्यात याचा उल्लेख ‘वाल्मीकी रामायणा’त ‘सिंहा: पक्षगम:’ असा केलेला आहे (रामायण, किष्किंधा 42, 16) त्या उल्लेखानुसार या पंखधारी सिंहांचे वास्तव्य जिथे सिंधू नदी समुद्राला मिळते त्या ठिकाणी असलेल्या सोमगिरी पर्वतावर होते. या स्थानाला पश्चिम दिशेचे टोक म्हणजे शेवटचे स्थान असे म्हटलेले आहे. यावरून असाही एक अंदाज बांधता येतो की, लेखकाने इराण, मेसोपोटेमिया इथल्या पारंपरिक कलाकृतींच्या पार्श्वभूमीवर हे लेखन केले असावे. कारण त्या प्रदेशात अशा अजस्र आकाराची शिल्पनिर्मिती केली जात असे. या शिल्पकृतींच्या कथा त्या देशांतून समुद्रमार्गे येणारे व्यापारी आणि प्रवासी यांच्याकडून लेखकाने ऐकलेल्या असणार आणि त्यानुसार त्याने आपल्या लिखाणात त्यांचा उल्लेख केलेला असणार. याचेच काही नमुने एका उत्खननात सापडले आहेत. इ.स.पूर्व 5 व्या शतकातल्या अॅकिमेनिड काळातला तो नमुना आहे. इकबाटन इथे झालेल्या उत्खननात काही सोन्याची भांडी मिळाली, ज्यावर पंखधारी सिंहाचे शिल्प कोरलेले सापडले. हमादान इथल्या उत्खननात कपडय़ावर लावायच्या सोन्याच्या बटणाच्या रूपात पंखधारी सिंह सापडले. तसेच पर्सिपोलीस इथल्या उत्खननात तलवारीच्या म्यानावर पंखधारी सिंहाची आकृती कोरलेली मिळाली.
पंखधारी शिंग असलेला सिंह – प्राचीन हिंदुस्थानी मूर्तींमध्ये अशा प्रकारच्या सिंहाचे शिल्प अगदी क्वचितच आढळते, पण जी शिल्पे उपलब्ध आहेत, त्यातले सर्वात सुंदर असे शिल्प सांची इथे आहे. पंखधारी, शिंग असलेला हा सिंह असून त्याच्या पाठीवर एक स्वार बसला आहे. त्या स्वाराने हातात लगाम धरलेला दाखवलेला आहे. काहीसा उग्र दिसणारा हा प्राणी आपल्याला सांची इथे बघायला मिळतो. याच्या तुलनेत अमरावती आणि नागार्जुनकोंडा इथे असलेले पंखधारी शिंग असलेले सिंहाचे शिल्प अगदीच साधे आहे.
ग्रिफिन (पंखधारी गरुडरूपी सिंह)
सिंहाचे शरीर, गरुडाची किंवा पोपटाची चोच आणि गरुडाचे पंख असलेला हा संमिश्र प्राणी. या प्राण्यांचे शिल्पांकन आपल्याला सांची इथे बऱयाच प्रमाणावर आढळते. चारही पाय दुमडून बसलेला हा प्राणी आपले पंख फुलवून मागे वळून बघतो आहे असे हे शिल्प. इथे सिंहाची आयाळ ठसठशीतपणे दाखवलेली आहे. सांची स्तूपाच्या पश्चिम तोरणावर समोरच्या बाजूला एकतर मागच्या बाजूला दोघे पाठीला पाठ लावून बसलेले ग्रिफिन आपल्याला दिसतात. इथेच 2 ाढमांकाच्या स्तूपाच्या कठडय़ावर अशा ग्रिफिनचे शिल्पांकन केलेले आहे. अशाच प्रकारचा एक ग्रिफिन मथुरा कलेमध्येसुद्धा बघायला मिळतो.
हिंदुस्थानी कलेच्या बाबतीत बोलायचं झालं तर ग्रिफिन हे नंतरच्या काळात दिसणाऱया श्येन, गरुड आणि शुक-व्याल या संकल्पनेचे प्राथमिक रूप म्हणता येईल. या ग्रिफिनच्या काही सुरस कथा आहेत. त्या पुढच्या भागात बघू या.
मिथक शिल्पे – शिल्प आणि चित्रांचा संदर्भ
>> आशुतोष बापट
साहित्यातील संदर्भ पाहिल्यानंतर आपण या काल्पनिक विश्वातील प्राण्यांचे अजून कुठे कुठे संदर्भ येतात हे शोधायला गेलो की, अर्थातच कलेमध्ये त्याचे पडलेले प्रतिबिंब स्पष्ट दिसून येते. मुळात साहित्यात जे संदर्भ आले आहेत त्याचे रूपांतर कलेत होणे हे अगदी क्रमप्राप्तच आहे म्हणा. ‘मिथीकल अॅनिमल्स इन इंडियन आर्ट’ या आपल्या पुस्तकात श्री. के. कृष्णमूर्ती यांनी या संकल्पनेचा सगळा ऐतिहासिक आढावा घेतलेला आहे. त्या पुस्तकावर आधारित असलेले आणि अजून बरेच निरनिराळे संदर्भ जोडून प्रसाद प्रकाशनाने ‘मिथक शिल्पे’ हे पुस्तक प्रकाशित केले. या पुस्तकात के. कृष्णमूर्ती यांनी विचारात घेतलेली ‘इहामृग’ ही संकल्पना, त्याचे कलेत पडलेले प्रतिबिंब हे मांडले आहेच, पण त्याशिवाय श्री. ढाकी यांनी पुढे मांडलेली ‘व्याल’ ही संकल्पना आणि त्याचे हिंदुस्थानी कलेत दिसणारे रूप याचासुद्धा विचार केला आहे. तसेच के. कृष्णमूर्ती यांनी सांची, अमरावती, नागार्जुनकोंडा इथली शिल्पे आणि अजिंठा लेणीतील भित्तिचित्रे यांचाच समावेश त्यांच्या पुस्तकात केला आहे. मात्र मराठी पुस्तकात विविध लेण्यांमध्ये दिसणारे हे काल्पनिक प्राणी आणि पुढे मंदिरांवर विपुल प्रमाणावर दिसणाऱया व्याल प्रतिमा यांचासुद्धा समावेश केलेला आहे.
के. कृष्णमूर्ती यांनी त्यांच्या पुस्तकात म्हटले आहे की, त्यांनी फक्त इ.स.च्या 6व्या शतकापर्यंतचा कालावधी लक्षात घेऊन त्या कालावधीत आढळणारी मिथक शिल्पे विचारात घेतली आहेत. कारण पुढे श्री. ढाकी यांनी ‘व्याल’ ही संकल्पना त्यांच्या पुस्तकातून विस्तृतपणे उलगडून दाखवली. त्यांनी ‘द व्याल फिगर्स ऑन द मेडिएव्हल टेंपल्स ऑफ इंडिया’ या त्यांच्या पुस्तकात ‘व्याल’ या संकल्पनेबद्दल खूप सखोल अभ्यास मांडला आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार अंदाजे इ.स.च्या 4थ्या शतकापासून ‘व्याल’ ही संकल्पना विकसित झाल्याचे दिसून येते.
या काल्पनिक संमिश्र प्राण्यांबद्दल कलाकारांच्या मनात काय कमालीचे आकर्षण होते आणि त्याचबरोबर त्यांच्या कल्पनाशक्तीची झेप किती अफाट होती हे यावरून दिसून येते. कुठल्याही दोन भिन्न प्राण्यांच्या शरीराचे विशिष्ट भाग एकत्र करून एक नवीनच प्राणी सादर करायचा असा जणू छंदच त्यांना जडला होता. या संकल्पनेचे कलेमध्ये सादरीकरण करताना या कलाकारांची कल्पनाशक्ती किती अचाट होती याची जाणीव, हे सगळे व्याल बघताना आपल्याला प्रकर्षाने होते. हे सगळे इतक्या मोठय़ा संख्येने असलेले आणि विविध प्रकारचे प्राणी आपल्यासमोर सांगताना त्यांची वैशिष्टय़ानुसार निरनिराळ्या गटात विभागणी केली आहे. हे एवढे सगळे विविध प्रकार एकत्र करताना त्यांची काही वैशिष्टय़े लक्षात घेऊन ती इथे सादर केली आहेत. त्यांचे अवयव किंवा कुठल्या प्राण्याचे अवयव त्यांना जोडले आहेत हे विचारात घेऊन त्यांचे साधारण वर्गीकरण केले आहे. के. कृष्णमूर्तींनी त्यांच्या पुस्तकात हे इहामृग किंवा व्याल मांडताना ते साधारणत तीन प्रकारांत विभागले आहेत. आकाशगामी प्राणी (व्योमचरिन्), जमिनीवरचे प्राणी (भूचरिन्), आणि पाण्यातले प्राणी (जलचरिन्) असे हे तीन प्रकार होत. या प्राण्यांना दाखवलेल्या विशिष्ट अवयवांमुळे त्यांचे वर्गीकरण अशा तीन प्रकारांत केलेले आहे. यातले काही प्राणी दोन गटांतसुद्धा मोडतात. मूलत तो प्राणी कोण आहे आणि मग त्याला कुठले अवयव जोडले आहेत याचा विचार इथे केला आहे. मूलत तो प्राणी जर जमिनीवरचा असेल आणि त्याला पंख जोडले असतील तर त्याचा समावेश आकाशगामी प्राण्यात केला आहे. त्याचे बदललेले रूप कोणते आहे यावर तो कुठल्या गटात बसतो हे ठरवले आहे. या काही तांत्रिक बाबी जरी असल्या तरी यातली नाटय़मयता, त्या प्राण्यांचे नवीन तयार झालेले रूप, त्यातल्या काही प्राण्यांचे परकीय कलेशी असलेले साधर्म्य किंवा पूर्णपणे परदेशी कलेतच त्यांचा असलेला आढळ यांचा ऊहापोह त्या त्या वेळी केलेला आहे. के. कृष्णमूर्तींनी तर अनेक प्राण्यांच्या कथा, लोककथा यांचे खूप रंजक वर्णन केले आहे. यातल्या प्रत्येक प्रकारातील गमतीशीर प्राणी आपण इथे बघणार आहोत.
ashutosh.treks@gmail.com
मिथक शिल्पे – इहामृग
>> आशुतोष बापट
मिथक शिल्पे म्हणजे प्राणी वा पक्ष्यांचे एकत्रीकरण किंवा त्यांचे संमिश्र रूप. थोडक्यात काय तर एका प्राण्याचे तोंड आणि दुसऱया प्राण्याचे शरीर अशी संयुक्त रचना करून तयार केलेली शिल्पे. अशी शिल्पे आपल्याला फार प्राचीन काळापासून भारतीय कलेमधे दिसून येतात. या प्रकाराला सरसकट ‘व्याल’ असे सध्या जरी म्हणत असले तरी ‘व्याल’ हा शब्द इ.स.च्या साधारण 6 व्या शतकानंतर वापरला जाऊ लागला. संयुक्त प्राणी ज्याला इंग्रजीत ‘मिथीकल अॅनिमल’ असं म्हटलं गेलं आहे. हे अशा प्रकारचे काल्पनिक प्राणी कलेत दाखवणे ही कलाकाराच्या कल्पनाशक्तीची उत्तुंग भरारी म्हणावी लागेल. कलाकारांच्या या कल्पनाशक्तीला जोड मिळाली ती या प्राण्यांच्या साहित्यातून येणाऱया वर्णनांची आणि त्याचबरोबर परकीय कलेच्या प्रभावाची. भारतीय कलेमध्ये अशा संयुक्त प्राण्यांच्या वापराचे संदर्भ आपल्याला अगदी प्राचीन साहित्यातून मिळतात. साहित्यात अशा प्राण्यांना ‘इहामृग’ असे म्हटले गेले आहे.
‘इहामृग’ याचा शब्दश अर्थ ‘इच्छाधारी हरीण’ असा होतो किंवा त्याचा अर्थ एक काळवीट असा आहे. मात्र ‘इहामृग’ हा शब्द काही विशिष्ट हेतूनेच वापरला जातो. काही प्राचीन साहित्यात काही ठिकाणी असेही उल्लेख सापडतात की, माणसाचा तोंडावळा हा कुठल्या तरी प्राण्याच्या किंवा पक्ष्याच्या रूपाशी साम्य दाखवतो. मग यातूनच पुढे माणसाचे शरीर आणि कुठल्याशा प्राण्याचे किंवा पक्ष्याचे तोंड असलेला प्राणी दाखवणे किंवा दोन भिन्न प्राण्यांचे एकत्रीकरण करून एखादी काल्पनिक कलाकृती करणे हे कसब कलाकारांनी साधले. यालाच पुढे ‘इहामृग’ असे म्हणू लागले. थोडक्यात काय तर ‘इहामृग’ म्हणजे कलाकाराच्या डोक्यातून आलेली कुठल्याशा संमिश्र प्राण्याची एक विलक्षण काल्पनिक प्रतिमा होय.
प्राचीन भारतीय साहित्यात इहामृगाचे खूप संदर्भ सापडतात. या संदर्भांचे धागेदोरे अगदी ऋग्वेदापर्यंत गेलेले आहेत. ऋग्वेदात ‘इहामृग’ असा शब्द येत नाही, तर ‘यातु’ असा शब्द आहे. उलुकयातु म्हणजे घुबड, स्वयातु म्हणजे कुत्रा, कोकायातु म्हणजे कोकिळा, सुपर्णयातु म्हणजे गरुड तर गृध्रयातु म्हणजे गिधाड. ऋग्वेदात या सगळ्यांचा इंद्राशी संबंध जोडलेला दिसतो. ऋग्वेदात इंद्राला ‘नृयातु’ असा शब्द आहे.
माणसाचे शरीर आणि प्राण्याचे शरीर हे अर्थातच भिन्न-भिन्न साच्यांतून तयार झालेले आहे. या दोन भिन्न साच्यांच्या एकत्रीकरणातून म्हणा किंवा दोन भिन्न गोष्टींच्या संयोगातून काही काल्पनिक प्रकार उदयाला आले. कलेमध्ये असे एकत्रीकरण दाखवण्याची कल्पना हळूहळू विकसित होत गेली आणि त्यातूनच गणपती, हयग्रीव, हनुमान, वृक्षकपी, नृसिंह, नृवराह असे निरनिराळे आकार, आकृतिबंध किंवा प्रारूपे विकसित होत गेली. ऋग्वेदात अशा काही चमत्कारिक प्रारूपांचे किंवा आकृतिबंधांचे संदर्भ आलेले आहेत. जसे की चार शिंगे, दोन डोकी, तीन पाय, सात हात असलेला बैल दिसतो. तिथे त्याला ‘अग्नी’ असे संबोधले गेले आहे. तसंच ऋग्वेदात कुणा चार शिंगांच्या रेडय़ाचेसुद्धा वर्णन येते. अथर्ववेदात दहा डोकी असलेल्या ब्राह्मणाचा उल्लेख येतो. ‘दशशीर्ष दस्य’ असे त्याला म्हटलेले आहे, तर ‘शतपथ ब्राह्मणा’त दहा डोक्यांचे वासरू आणि दोन तोंडांचा गरुड यांचा उल्लेख आलेला आहे. हे सगळे प्रकार ‘इहामृग’ या संकल्पनेत गणले गेलेले आहेत. थोडक्यात काय तर प्राचीन काळी कुठल्याही अद्भुत किंवा चमत्कारिक प्राण्याला ‘इहामृग’ म्हणत असत असं दिसतं.
‘वाल्मीकी रामायणा’त इहामृगाचं चित्रमय वर्णन येते. त्यातील उल्लेखानुसार या इहामृगांचे शिल्पांकन अत्यंत सुबकतेने राजवाडय़ाच्या खांबांवर कोरलेले आहे. मात्र हे आकृतिबंध त्या खांबांवर नक्की कुठे आणि कशा प्रकारे कोरले होते याबद्दल रामायण काही बोलत नाही. त्यामुळे हे इहामृगांचे कोरीवकाम नेमके कुठे केले असेल याबद्दल निव्वळ अंदाजच बांधावा लागतो. वरील उल्लेख रामायणाच्या ‘सुंदरकांडा’त काही ठिकाणी आलेले आहेत. महाभारतातसुद्धा इहामृगासंबंधी काही संकल्पना येतात. ‘मीनवजी’ किंवा ‘गजवक्रतजश’ अशा नावाने येणारे ते उल्लेख होत (इशानाम गजवत्रानाम मुलुकानाम ततैवच मीनवाजी स्वरूपानाम). याचा अर्थ हत्तीचे किंवा घुबडाचे डोके असलेले मासे ‘मत्स्यअश्व’ या कल्पनेशी जवळीक दाखवतात.
वैदिक साहित्य किंवा रामायण, महाभारतासारखी महाकाव्ये यातून ‘इहामृग‘ ही संकल्पना कशी डोकावते, याचे थोडे थोडे विस्कळीत का होईना, पण काही संदर्भ आणि त्याची उदाहरणे आपल्याला दिसतात. यावरून ही संकल्पना तत्कालीन कलाकारांना माहिती तर होतीच, शिवाय ती त्यांच्या आवडीचीही असावी हे म्हणायला जागा आहे.
ashutosh.treks@gmail.com
मिथकशिल्पे – भारतीय कलेतील पौराणिक प्राणी
>> आशुतोष बापट
प्राचीन भारतीय मंदिरे, लेणी हे आपले स्थापत्य वैभव. आपल्या पूर्वसुरींनी निर्माण केलेले हे स्थापत्य आज आपल्याला त्यांच्या कर्तृत्वाची, सामर्थ्याची आणि वैभवाची गाथा सांगतात. मंदिरे, मूर्ती, मंदिरांची रचना, त्यांचे स्थापत्य अशा अनेक विषयांवर विविध अभ्यासकांनी विपुल लेखन केले आहे. मंदिर स्थापत्य आणि मूर्तिशास्त्र हा विषयच मुळी असा आहे की, त्यावर विविधांगांनी अभ्यास करता येतो. त्यावर लेखन करता येते आणि मग त्यातले निरनिराळे पैलू उलगडून दाखवता येतात. मंदिर हे केवळ त्या देवाचे निवासस्थान न राहता ती एक सामाजिक संस्था होऊन जाते. समाजात घडणाऱया विविध गोष्टींचे प्रतिबिंब मंदिरांवर निरनिराळ्या शिल्पांच्या रूपाने आपल्याला बघायला मिळते. मग कधी ही शिल्पे युद्धाची असतात, कधी माणसाच्या दैनंदिन जीवनात घडणाऱया प्रसंगांची असतात, कधी देवदेवतांची असतात, तर कधी कामशिल्पेसुद्धा मंदिरावर कोरलेली आढळतात. या प्रत्येक शिल्पाच्या तिथे असण्याला काहीतरी अर्थ असतो, त्याचे काहीना काही प्रयोजन असते. उगाचच जागा आहे म्हणून कुठलेसे शिल्प मंदिरावर कोरले आहे असे अजिबात होत नाही. मग त्या शिल्पामागे कुठलीशी पौराणिक कथा असेल, त्या-त्या विशिष्ट देवतेचे महत्त्व समजावून सांगण्यासाठी त्या देवतेचे सामर्थ्य दाखवणारी ती शिल्पे असतील किंवा कुठल्या तत्त्वज्ञानाची ओळख त्या विशिष्ट शिल्पाच्या माध्यमातून करून दिलेली असेल. प्रत्येक शिल्प हे काहीतरी प्रयोजन घेऊनच मंदिरावर विराजमान झालेले असते. त्यामुळे या शिल्पांमध्ये खूप मोठय़ा प्रमाणावर विविधता दिसून येते. त्यांचे विषय वेगळे, त्यांची शैली वेगळी, त्यांची तऱ्हाच निराळी.
मंदिरांवर, लेणींमध्ये किंवा विविध स्थापत्यावर दिसणाऱया विविध शिल्पांमध्ये प्राणी आणि पक्ष्यांचे शिल्पांकन बघायला मिळते आणि यातसुद्धा संमिश्र प्राणी आणि पक्षी कोरलेले जेव्हा दिसून येतात तेव्हा ते बघून नक्कीच आश्चर्य वाटते. काय प्रयोजन असेल असे संमिश्र प्राणी-पक्षी इथे कोरण्याचे हे समजून येत नाही. वाघ, सिंह, मोर, गरुड, नंदी असे प्राणी आपण समजू शकतो. विविध देवतांची ती वाहने म्हणूनसुद्धा त्यांचे शिल्पांकन मंदिरावर केलेले आढळते. मात्र कधी कधी माणसाचे तोंड आणि सिंहाचे शरीर किंवा शिंग असलेला सिंह आणि पंख असलेला बैल असे जेव्हा शिल्पांकन केलेले दिसते तेव्हा मात्र यामागचे कारण काय असेल ते समजत नाही. ही शिल्पे उगाचच कोरली असतील का? की ही शिल्पे म्हणजे कलाकारांचा निव्वळ कल्पनाविलास असेल? फक्त भारतातच अशी शिल्पकला दिसून येते की जगभर हा प्रकार दिसतो? अशा संमिश्र शिल्पांना काय म्हणतात? यांचे संदर्भ कुठे साहित्यात म्हणा किंवा शास्त्रग्रंथात दिसून येतात का? असे असंख्य प्रश्न आपल्या समोर येऊन उभे राहतात आणि मग त्या प्रश्नांची उत्तरे शोधायला गेलो की, एकेक सुंदर आणि आश्चर्यकारक गोष्टी समोर येऊ लागतात. शिल्पकलेतील एक निराळेच दालन आपल्या समोर उघडले जाते. थक्क करणाऱया विविध कथा समोर येतात आणि मग आपण शिल्पकलेतील या रंजकतेचा मागोवा घेऊ लागतो. संमिश्र प्राणी, काल्पनिक प्राणी किंवा पौराणिक प्राणी अशी विविध नावे घेऊन ही शिल्पे आपल्या समोर येतात आणि त्यांचे अंतरंग उलगडू लागतात.
प्राचीन भारतीय कलेचा अभ्यास करताना, विशेषत शिल्पकला आणि चित्रकला या कला विविध विषयांनी, देवदेवतांच्या कथांनी आणि त्यावर आधारित शिल्पांनी, पानाफुलांच्या सजावटींनी बहरलेल्या दिसतात. याशिवाय विविध पशुपक्षी यांचाही इथे समावेश होतो. या लेखमालेचा विषय हा प्राचीन भारतीय कलेत दिसणाऱया पशुपक्ष्यांशीच निगडित आहे. जरी हा विषय भारतीय कलेत दिसणाऱया पशुपक्ष्यांसंबंधी असला तरी इथे पशुपक्ष्यांचे निव्वळ वर्णन नसून, निरनिराळ्या पशुपक्ष्यांचे एकत्रीकरण करून तयार झालेले विलक्षण, मोहक असे काल्पनिक प्राणिविश्व आणि त्यांच्यामुळे बहरलेली भारतीय कला दाखवण्याचा प्रयत्न या लेखमालेत केला आहे.
ashutosh.treks@gmail.com
मिथक शिल्पांचे देखणेपण
आशुतोष बापट / वारसा वैभव
प्राणी वा पक्ष्यांचे एकत्रीकरण किंवा त्यांचे संमिश्र रूप म्हणजे एका प्राण्याचे तोंड आणि दुसऱया प्राण्याचे शरीर अशी संयुक्त रचना करून तयार केलेली शिल्पे आपल्याला प्राचीन काळापासून हिंदुस्थानी कलेत दिसून येतात. या व्यालप्रतिमा म्हणजेच मिथकशिल्पांचे देखणेपण उठून दिसते.
शंकराच्या मंदिरात गेल्यावर गाभाऱयाच्या उंबरठय़ावर एक राक्षसाचे तोंड कोरलेले दिसते. कार्ल्याच्या लेणीत गेल्यावर तिथल्या खांबांवर कुणी चमत्कारिक प्राणी दिसतात. राशीपा बघताना धनु राशीचे चिन्ह दाखवताना अर्धा घोडा आणि अर्धा माणूस दाखवतात. काही काही देवळांवर चांगले तीन फूट उंचीचे प्राणी दिसतात. त्यांचे तोंड हत्तीचे असते आणि उरलेला देह सिंहाचा असतो. हंपीला गेल्यावर तिथल्या विठ्ठल मंदिराच्या खांबावर एक निराळाच प्राणी दिसतो. वेगवेगळ्या प्राण्यांचे अवयव एकत्र करून घडवलेला हा प्राणी असतो. त्याचं नाव काही सांगता येत नाही. त्याचं नक्की रूप काय आहे हेदेखील समजत नाही. काय असतं हे सगळं? कशासाठी अशी रचना केलेली असते? या प्राण्यांची काही कथा आहे का? असे असंख्य प्रश्न आपल्याला पडतात आणि त्याची समाधानकारक उत्तरे काही मिळत नाहीत.
या सगळ्या प्राण्यांना मिथक प्राणी, पौराणिक प्राणी किंवा काल्पनिक प्राणी असे म्हणतात. या सगळ्याचा एक सोपा शब्द नंतर समोर येतो तो म्हणजे ‘व्यालशिल्पे’. यांना व्याल असे संबोधले जाते. प्राणी वा पक्ष्यांचे एकत्रीकरण किंवा त्यांचे संमिश्र रूप म्हणजे एका प्राण्याचे तोंड आणि दुसऱया प्राण्याचे शरीर अशी संयुक्त रचना करून तयार केलेली शिल्पे आपल्याला प्राचीन काळापासून हिंदुस्थानी कलेत दिसून येतात. या प्रकाराला ‘व्याल’ असा शब्द जरी सध्या रूढ झालेला असला तरी हा शब्द साधारण इ.स.च्या 6 व्या शतकानंतर वापरला जाऊ लागला. संयुक्त प्राणी ज्याला इंग्रजीत ‘मिथीकल अॅनिमल‘ असं म्हटलं गेलं आहे, त्याला आपण पौराणिक किंवा खरं तर काल्पनिक प्राणी म्हणू शकतो. हे असे प्राणी कलेत दाखवणे ही कलाकाराच्या कल्पनाशक्तीची भरारी म्हणावी लागेल. कलाकारांच्या या कल्पनाशक्तीला जोड मिळाली आहे ती या प्राण्यांच्या साहित्यातून येणाऱया वर्णनांची आणि त्याचबरोबर परकीय कलेच्या प्रभावाची. हिंदुस्थानी कलेमध्ये अशा संयुक्त प्राण्यांच्या वापराचे संदर्भ आपल्याला प्राचीन साहित्यांतूनही मिळतात. साहित्यात अशा प्राण्यांना ‘इहामृग’ असे म्हटले गेले आहे.
प्राचीन हिंदुस्थानी साहित्यात विविध ग्रंथांसोबतच मत्स्य, लिंग, हरिवंश, वायू, ब्रह्म, वामन या पुराण ग्रंथांमधूनही विविध ठिकाणी इहामृगाचा उल्लेख आलेला आहे. किंबहुना पौराणिक लेखकांनी या इहामृगांची एक यादीच दिलेली आहे. गजानन, ह्यानन, सिंहानन, व्याघ्रानन, मृगेंद्रवदन, खरमुख, मकरानन, इहामृगमुख, काकमुख, गृद्धमुख अशी अनेक नावे या यादीत दिसून येतात. कालिदासाचे प्रसिद्ध नाटक ‘रघुवंश’ यातही अर्धा हत्ती-अर्धा मत्स्य अशा एका दैत्याचा उल्लेख येतो.
इ.स.पूर्व दुसऱया शतकापासून लयनस्थापत्य महाराष्ट्रात मोठय़ा प्रमाणावर दिसून येते. चैत्यगृह आणि विहार असे लेण्यांचे स्वरूप असते. लेणीचा दर्शनी भाग (फसाड) आकर्षकरीत्या कोरलेला दिसतो. लेण्यांमध्ये असलेल्या स्तंभांवर आपल्याला प्राणी कोरलेले दिसून येतात. बेडसे आणि कार्ले तसेच लेण्याद्री इथे या प्राण्यांच्या पाठीवर कुणी एकटा स्वार तर कधी दंपती बसलेली दाखवतात. मात्र या लेण्यांमधून खूप सुंदर असे संमिश्र प्राणी कोरलेले दिसून येतात. पितळखोरा, भाजे, जुन्नर, लेण्याद्री, नाशिकची पांडवलेणी या लेण्यांतून स्फिंक्स, सेंटॉर, किन्नर कोरलेले आहेत. म्हणजे नुसते सांची, अमरावती, मथुरा इथल्या कलेतच नाहीत तर या लेण्यांतूनही या पौराणिक प्राण्यांचे दर्शन कलाकारांनी आपल्याला करून दिले आहे. यात पंख असलेला सिंह, चोच असलेला सिंह, माणसाचा चेहरा असलेला सिंह, पंख असलेले घोडे, हत्ती अशी विविधता दिसते. नाग व गरुडाचे मानवीकरण केलेली शिल्पे कोरलेली आहेत.
संमिश्र प्राणी किंवा संमिश्र पक्षी यांचे कलेतील सादरीकरण आपण सांची, भारहूत, अमरावती, नागार्जुनकोंडा इथे तसेच अजिंठा इथल्या लेणींमधील चित्रकलेत बघितले. ‘इहामृग’ अर्थात संमिश्र प्राण्यांची संकल्पना पुढे ‘व्याल’ या संकल्पनेत परावर्तित झालेली दिसून येते आणि इ.स.च्या 6 व्या शतकानंतर बांधलेल्या अनेक मंदिरांवर हे व्याल किंवा असे संमिश्र प्राणी मोठय़ा प्रमाणावर कोरलेले दिसून येतात. हे व्याल कोरताना भिन्न प्राण्यांची शरीरे एकत्र करून हे काल्पनिक प्राणी कोरले गेले आहेत. एका प्राण्याचे तोंड आणि दुसऱया एका किंवा एकापेक्षा जास्त प्राण्यांच्या शरीराचे भाग एकत्र करून असे व्याल कोरले गेले. ज्या प्राण्याचे तोंड कोरलेले असेल त्याच्या नावाने तो व्याल ओळखला जातो. उदाहरणार्थ, हत्तीचे तोंड आणि शरीर सिंहाचे असे शिल्प असेल तर त्याला ‘गजव्याल’ असे म्हटले जाते. मग मकरव्याल, अश्वव्याल, अजव्याल, गणेशव्याल अशा असंख्य व्याल प्रतिमा मंदिरांवर कोरलेल्या दिसून येतात. खजुराहो इथल्या मंदिरांवर असे व्याल दिसून येतात. महाराष्ट्राचा विचार करायचा झाला तर गडचिरोली जिह्यातल्या मार्कंडा मंदिरावर खूप मोठय़ा संख्येने व्याल कोरलेले आहेत. तारकाकृती आकारामुळे मंदिराच्या बाह्य भिंतीना अनेक कोन निर्माण होतात. उठाव असलेल्या भिंतींवर विविध देवदेवतांच्या मूर्ती कोरलेल्या दिसून येतात, तर त्या दोन मूर्तींच्या आतमध्ये असलेल्या कोनांवर व्याल प्रतिमा कोरलेल्या असतात. या व्याल प्रतिमांचे देखणेपण आणि त्यांचा ठसठशीतपणा प्रकर्षाने उठून दिसतो.
छत्तीसगडच्या पाली इथल्या मंदिरावर नरव्यालाची मूर्ती आहे. चेहरा माणसाचा आणि उर्वरित शरीर प्राण्याचे असा हा नरव्याल इथले मुख्य आकर्षण म्हणायला हवा. इथले व्यालसुद्धा हत्तीच्या पाठीवर दाखवलेले आहेत. याचा अर्थ हत्ती आणि या व्याल प्रतिमा यांचा काहीतरी संबंध असण्याची दाट शक्यता दिसते. या मंदिरावरचे व्याल फारच देखणे आहेत आणि देवतांना जसे विविध दागदागिने दाखवतात तसे विविध दागिने या व्यालांच्या अंगावर कोरलेले दिसतात. इतकी सुंदर शिल्पकला अर्थातच चकित करून टाकते. तत्कालीन कलाकारांची कलासक्त नजर आणि कुठलीही गोष्ट सादर करताना ती अतिशय मोहक रूपात सादर केली पाहिजे ही ओढ प्रकर्षाने जाणवते.
> ashutosh.treks@gmail.com
रथ सहस्ररश्मीचा
चोवीस महाकाय रथचक्रे, दगडात कोरलेली, पण अशा कौशल्यानं, वाटावे लाकडातून कोरलेली ही खरीखुरी रथचक्रे आहेत. या चाकांना जोडणारी आख आणि त्यावर बसवलेली भलीमोठी मेखही तशीच, अगदी खऱ्या रथाच्या चाकांसारखी. तो २४ चाकांचा महाकाय रथ बघताना आपण स्थळकाळाचे भान हरपून जातो. वाटतं, आता कोणत्याही क्षणी सारथी चाबूक उगारेल आणि रथाला जुंपलेले सात विराट अश्व क्षणात विजेच्या वेगाने दौडू लागतील. त्या घोड्यांची नावे तरी कशी सुंदर आणि अर्थपूर्ण, गायत्री, वृहति, उष्णिक, जगती, त्रिष्टुप, अनुष्टुप आणि पंक्ती, संस्कृत काव्यछंदांची नावे. त्या सात घोड्यांचे लगाम हाती धरलेला सारथी तो अरुण आणि त्या अलौकिक रथाचा स्वामी म्हणजे साक्षात सूर्यदेव! सहस्ररश्मी भगवान सूर्यदेव आपल्या सात अश्वांच्या रथात बसून दिवसभराच्या प्रवासाला निघाले आहेत ह्या पौराणिक कथेला दिलेले सुरेख मूर्तस्वरूप म्हणजे ओडिशा मधले कोणार्क येथील प्रसिद्ध सूर्यमंदिर.
हे मंदिर मी जेव्हा प्रथम बघितले तेव्हा मी कितीतरी वेळ अक्षरशः अवाक् होऊन उभी होते. कोणार्कच्या सूर्यमंदिराचे कितीही फोटो बघितलेले असले तरी जेव्हा तुम्ही प्रत्यक्षात ती विराट रथचक्रे आणि त्यावर विसावलेला तो महाकाय रथरुपी सभामंडप पाहता तेव्हा कितीही अरसिक असलात तरी तुमच्या अंगावर रोमांच उभे राहिल्याशिवाय राहात नाहीत. कोणार्कचे हे मंदिर म्हणजे दगडात रचलेली एक पवित्र सूर्यऋचा आहे. कोणार्कच्या या सूर्यमंदिराच्या स्थळ महात्म्याविषयी अनेक कथा प्रसिद्ध आहेत. श्रीकृष्णपुत्र सांब कुष्ठरोगाने ग्रस्त झाला होता. श्रीकृष्णाने त्याला सूर्यदेवाची उपासना करायला सांगितली. कुष्ठरोगातून मुक्त होण्यासाठी सांबाने ओडिशा राज्यात येऊन चंद्रभागा नदीच्या तीरावर सूर्योपासना केली.
सांबाला नदीपात्रात सूर्यमूर्ती सापडली आणि त्याने चंद्रभागा नदी समुद्राला मिळते त्या पवित्र ठिकाणी प्रथम सूर्यमंदिर उभारले अशी इथल्या भाविकांची धारणा आहे. आज चंद्रभागा नदी सुकून गेली आहे. समुद्रही मंदिरापासून तीन किलोमीटर मागे गेलेला आहे. आज कोणार्कमध्ये जे मंदिर उभे आहे ती वास्तू तेराव्या शतकात बांधली गेली आहे. गंगवंशीय राजा पहिला नरसिंहदेव आणि त्याची पत्नी सीतादेवी ह्यांनी हे सूर्यमंदिर उभारले. पहिला नरसिंहदेव हा अत्यंत शूर आणि कर्तबगार राजा होता. अनेक शत्रूंवर विजय मिळवून कलिंगाचे राज्य संघटित केले. या विजयाचे प्रतीक म्हणून त्याने कोणार्कचे सूर्यमंदिर बांधायला घेतले व आपला आपला कीर्तिस्तंभ तिथे उभा केला. तो अरुणस्तंभ सध्या जवळच्याच जगन्नाथ पुरी येथे श्री जगन्नाथ मंदिरासमोर आहे. कोणार्कच्या ह्या सूर्यमंदिराच्या निर्मितीसाठी १२ हजार स्थपती आणि शिल्पी बारा वर्षे खपत होते आणि या मंदिराच्या उभारणीसाठी राजा नरसिंहदेवाने आपले बारा वर्षांचे उत्पन्न खर्च केले असे अकबर कालीन इतिहास ग्रंथ ‘ऐन-ए-अकबरी’मध्ये नमूद केलेले आहे.
कोणार्कच्या सूर्यमंदिरासाठी वालुकाश्म व क्लोराइट शिस्ट अश्या दोन प्रकारचा दगड वापरला आहे. मला ओडिशा मधल्या एका शिल्पकाराने त्या दगडांची फूल खाडिया आणि मुग्नी अशी स्थानिक नावे सांगितली होती. वालुकाश्म हा दगड खडबडीत पण टणक असतो तर क्लोराइट शिस्ट खाणीतून काढल्यावर मऊ असतो पण पुढे ऊन वारा पाऊस पिऊन टणक होत जातो. नवीन दगड मऊ असल्यामुळे स्थपती आणि शिल्पकारांना अतिशय बारीक, नाजूक कोरीव काम करणे सोपे होते. कोणार्कची रथचक्रे बघताना त्यावरचे शिल्पांकन अगदी दागिन्यांच्या तोडीचे वाटते ते या दगडामुळे.
कोणार्कच्या मंदिराच्या बांधणीत वास्तुकला व शिल्पकला ह्यांचा इतका सुंदर संगम झालेला आहे की वास्तूचे सौष्ठव आणि प्रमाणबद्धता बघणाऱ्याला जास्त भुरळ घालते की मंदिरावरचे कोरीव काम हे सांगता येत नाही. सध्या अस्तित्वात असलेला सूर्यरथाच्या स्वरूपातला सभामंडप, ज्याला कलिंग स्थापत्याच्या भाषेत ‘जगमोहन’ हे नाव आहे, त्याचीच उंची जवळजवळ ४० मीटर आहे. त्याच्या पाठीमागे असलेल्या गर्भगृह आणि मुख्य शिखर ह्यांनी मिळून बनलेल्या रेखादेवळाची उंची त्याच्या जवळजवळ दुप्पट असली पाहिजे असे पुरातत्त्व शास्त्रज्ञांचे मत आहे. जगमोहनाच्या पुढे त्याच्या अर्ध्या उंचीचा नटमंडप आहे. चढत्या भाजणीने वाढत जाणारी मंदिराच्या विविध भागांची उंची भाविकांची नजर आपसूकच रेखा मंदिराच्या कळसाकडे नेते. ही ऊर्ध्वगामी दृष्टिरेषा हे नागर मंदिरांच्या स्थापत्यशैलीचे खास वैशिष्ट्य आहे.
कलिंग स्थापत्यशैली हा नागर शैलीचाच एक उपप्रकार मानला जातो. कलिंग स्थापत्याप्रमाणे मंदिराच्या वास्तूचे तीन भाग असतात, गर्भगृह म्हणजे रेखा देऊळ, ज्याचे शिखर उंच आणि निमुळते असते व वर गोलाकारआमलक असतो. रेखा देवळाच्या पुढे असतो तो मुख्य सभामंडप, ज्याला त्याच्या पिरॅमिड सारख्या शिखरामुळे पिढा देऊळ असे नाव आहे. यालाच भद्र देऊळ किंवा जगमोहन असेही म्हणतात. रेखादेऊळ उंच आणि निमुळते असते तर पिढा देऊळबुटके आणि पसरट असते. दोन्ही वास्तूंची उंची आणि आकार ह्यामध्ये एक सुंदर समन्वय असतो ज्यामुळे दर्शनाला आलेल्या भाविकांना भव्यतेची, दिव्यतेची अनुभूती येते. जगमोहनाच्याही पुढे नटमंडप किंवा नृत्यमंडप असतो, जो आकाराने सगळ्यात लहान असतो. या तिन्ही वास्तूंची प्रमाणबद्धता कोणार्कमध्ये इतकी सुरेख जमून आलेली आहे की आजच्या भग्नावस्थेत देखील मंदिर पाहून आपण पूर्णपणे भारावून जातो, आणि मनात विचार येतोच की पूर्णावस्थेतले रेखा देऊळ, त्यातली सूर्यनारायणाची मूर्ती, त्याला जोडून असणारे त्याच्या रथाच्या स्वरूपातले भव्य भद्रदेऊळ व त्यापुढील नृत्यमंडप यासर्व वास्तू त्यांच्या वैभवाच्या परमशिखरावर असताना किती देखण्या दिसत असतील!
कोणार्कच्या या सूर्यमंदिराची खासियत म्हणजे इथले भद्र देऊळ किंवा जगमोहन. कोणार्कच्या रथचक्रांचे फोटो आपण सर्वांनीच पाहिले असतील. पण एकेकट्या रथचक्राचे फोटो बघणे आणि प्रत्यक्ष अतिभव्य आकाराच्या रथाप्रमाणे रचलेले ते संपूर्ण वास्तूस्थापत्य अनुभवणे ह्यात जमीन अस्मानाचा फरक आहे. प्रत्यक्षाहुनी प्रतिमा उत्कट असे म्हणतात खरे पण कोणार्कचा हा भव्य सूर्यरथ प्रत्यक्षात इतका भव्य आहे की कुठलीही प्रतिमा त्यापुढे फिकीच वाटेल. मुळात दगडाचे विशाल सूर्यमंदिर रथाच्या आकारात कल्पून ते प्रत्यक्षात आणणे ही कल्पनाच किती उदात्त आहे!
एका उंच, प्रशस्त जगतीवर म्हणजे जोत्यावर हा विराट मंदिररूपी रथ उभा आहे. जगतीच्या चारी भिंतींवर मिळून बाराचक्रांच्या जोड्या कोरलेल्या आहेत ज्या वर्षांच्या बारा महिन्यांचे प्रतीक आहेत. १२ फूट व्यासाच्या प्रत्येक चक्राला आठ बारीक व आठ जाड आऱ्या कोरलेल्या आहेत. या आठ आठ आरी म्हणजे दिवसाचे आणि रात्रीचे प्रत्येकी आठ प्रहर आहेत. सूर्यदेवाच्या रथाला जोडलेले सात अश्व म्हणजे सप्ताहाच्या सात दिवसांचे प्रतीक आहे. बरे शिल्पकाराचे आणि स्थपतीचे कौशल्य केवळ इथेच संपत नाही, मंदिराच्या काही चक्रे म्हणजे वेळ दाखवणारी सौरघड्याळे आहेत. सूर्याचे किरण आऱ्याच्या मध्यावर पडून त्याची सावली वेळेनुसार प्रत्येक आऱ्यावर येते. प्रत्येक आरीवर बारीक पट्टी आहे, त्यावर वेळेनुसारत्या काळची आदर्श दिनचर्या कशी होती ते दाखवले आहे. म्हणजे दुपारपर्यंत कामे, मग थोडी वामकुक्षी, त्यानंतर मनोरंजन, सायंकाळची कामे, आणि रात्री झोप इत्यादीचे बारकाईने शिल्पांकन केले आहे. हे सर्व समजून घ्यायचे असेल तर आपल्याला कोणार्कमध्ये चांगला प्रशिक्षित गाईड घेणे फार आवश्यक आहे, कारण या मंदिरात शिल्पांची इतकी लयलूट आहे आणि त्यामागचा कार्यकारणभाव इतका गहन आहे की गाईड नसला तर नव्वद टक्के बारकावे आपल्याला उमजणारच नाहीत.
असे म्हणतात की राजा नरसिंहदेवाच्या काळात जेव्हा सूर्य मंदिर बनवले तेव्हा त्यावर २० टन वजनाचा प्रचंड लोहचुंबक होता. पण जवळच समुद्र असल्यामुळे खलाशांच्या होकायंत्राला अडथळा होऊ लागल्याने तो चुंबकच काढून टाकला गेला. त्यावेळी मंदिराला झालेली इजा व पुढे सोळाव्या शतकात काला पहाड नावाच्या इस्लामी सरदाराने ओडिशास्वारीत या मंदिराचा केलेला विध्वंस यामुळे मंदिराचा बराच भाग कोसळला होता. मंदिर भग्न झाल्यावर लोकांनी तिथे जाणे बंद केले व कोणार्कचे मंदिर हळूहळू वाळूने भरू लागले. रेती अर्धवट गाडले गेलेले हे मंदिर नंतर १८९३ मध्ये ब्रिटिशपुरातत्व शास्त्रज्ञांनी उकरून काढले. पुढे भारतीय पुरातत्व विभागाने या प्राचीन वास्तूवरील वाळूचे प्रचंड आवरण दूर करण्याचे काम १९०१ पासून हाती घेतले.
आज जे मंदिर आपल्याला दिसते ते भग्नावस्थेत आहे. मंदिराचा गाभारा उध्वस्त झालेला आहे. बाहेरच्या देवकोष्ठातील काही सूर्यमूर्ती वस्तुसंग्रहालयात गेलेल्या आहेत तर काही गायब झालेल्या आहेत. मुख्य गाभाऱ्यातली सूर्यमूर्ती कोठे आहे ते कोणालाच माहिती नाही. जगमोहनाची नाजूक परिस्थिती पाहता ब्रिटिशांनी आत वाळू भरून वास्तू पूर्णपणे सील केली आणि बाहेर टेकूसाठी लोखंडी पिंजरा उभारलेला आहे. एकूण वास्तूच्या सौंदर्याशी तो पिंजरा अत्यंत विसंगत आणि कुरूप दिसतो, पण करणार काय? शिल्पकला आणि स्थापत्य या दोन्ही गोष्टींनी नटलेले कोणार्कचे हे सूर्यमंदिर एकाच वेळी अभिमान आणि विषाद अशा परस्परविरोधी भावना दाटून येतात. प्रत्येक भारतीयाने पाहिलेच पाहिजे असे हे मंदिर आहे.
(सदराच्या लेखिका मंदिरस्थापत्यशैलीच्या अभ्यासक आहेत)
पाचवीला पुजलेली सटी
आतल्या खोलीतून नुकत्याच जन्मलेल्या बाळाच्या रडण्याचा आवाज येतोय. बाहेरच्या बाजूला मात्र काही साहित्याची जमवाजमव चाललीय. ‘मालटा’ नावाने ओळखला जाणारा दगडी दिवा, जाते, पाटा-वरवंटा अशा दगडी साहीत्याची यादी केली जातेय. कधीकाळी नेहमीच्या वापरात असलेल्या या वस्तू, पण सध्याच्या काळात मिळवणे दगडासारखेच कठीण झाल्यासारख्या. ही सर्व जमवाजमव चालली आहे ती जन्माला आलेल्या बालकाला कुठलीही बाधा होऊ नये, त्याला चांगले आयुष्य व आरोग्य लाभावे या हेतूने केल्या जाणाऱ्या पाचवीची. सहसा मुलीकडे होणारा हा विधी. संपूर्ण महाराष्ट्रात थोड्याफार साम्य-भेदाने होत असलेला हा विधी पश्चिम किनारपट्टीवरील रायगड परिसरातही होताना दिसतो.
या विधीवेळी लहान बाळाला वस्त्रांशिवाय निंगडीच्या म्हणजेच निरगुडीच्या पानांवर झोपवले जाते. या पानांवरून उचलण्याचा मान आत्याचा असतो. निरगुडी ही वनस्पती आयुर्वेदाच्या दृष्टीने उपयुक्त असल्याचे मानले जाते. पाचवीच्या या विधीमध्ये एका सुपात तांदळावर कलश ठेवतात. त्यावर नारळ ठेवून केळीच्या पानाचा लहानसा भाग उभा केला जातो. समोर पानाचे पाच विडे मांडून त्या विड्यांवर सुपारी,बदाम, खारीक,अक्रोड,हळकुंड यांसारखे पदार्थ मांडले जातात. या दिवशी घुगऱ्या ,उकडीच्या पीठाचे मुटके, पिठाचा दिवा बनवला जातो. बाळंतिणीच्या खाटेच्या चार पायांजवळ चार पीठाचे दिवे व एक दिवा मोरीजवळ ठेवतात.
जिल्ह्याच्या उत्तर भागातील विधीमध्ये नाममात्र फरक असतो. इथे पाट्यावर वरवंटा ठेवून सात विड्याची पाने देठ खाली करून वरवंट्याला टेकून ठेवतात .पानाच्या टोकांना शेंदूर लावतात. काजळाची दोन बोटे प्रत्येक पानाला दोन डोळे म्हणून लावतात. काही ठिकाणी रुईच्या पानांवर ‘सटी व लाठा’ अशी दोन चित्रे काढली जातात. समोर पीठाचे सात दिवे व पाटयाच्या चार कोपऱ्यांना चार पीठाचे दिवे लावतात. प्राचीन परंपरेची जपणूक करणारा मालटा हा दगडी दिवा पाट्याच्या मध्यभागी लावतात. नंतर पूजन करून नैवैद्य दाखवला जातो.
याच विधीला ‘सटी’ असेही म्हटले जाते. ही सटी म्हणजे ‘सटवाई’ किंवा ‘सटवी’ या नावाने ओळखली जाणारी आणि प्राचीन काळापासून पुजली जाणारी मातृदेवता. अगदी शिवी म्हणून वापरला जाणारा हा शब्द खरंतर मूळ संस्कृत ‘षष्ठी’ या शब्दापासून तयार झाला आहे. मुलाच्या जन्मानंतरच्या सहाव्या रात्री ‘सटवी’ देवीची शांती करण्यासाठी रात्रभर दिवा लावून ठेवतात. पाट्यावर एक नारळ, कोरा कागद, पेन किंवा पेन्सिल, मुलगा असेल तर हातोडा व मुलगी असेल तर कोयती असे एक शस्त्रही ठेवतात व त्यांचे पूजन करतात. त्या रात्री देवी स्वत: येऊन त्या मुलाच्या कपाळावर त्याचे अदृश्य पण अटल भवितव्य आणि स्वभाववैशिष्ट्य लिहिते, असा समज आहे. यालाच ‘ब्रम्हलिखित’ असे म्हटले जाते. "सटीचा लेखाजोखा, न चुके ब्रम्हादिका" अशी एक म्हण या देवीबाबत प्रचलित आहे. महाराष्ट्राच्या ग्रामीण भागात या देवीची पूजा जास्त प्रचलित आहे. रस्त्याच्या कडेला किंवा चौरस्त्यावरील दगडावर दिसणाऱ्या लाल रेघा, अर्पण केलेले अन्न आणि कापलेला लिंबू ह्या सटवीच्या व्रताच्या खुणा. रात्रीच्या वेळेस उपासक स्त्रीद्वारे हे क्रियाकर्म केलेले असते.
सटवी, सटुआई, सटी,षष्ठी,रानसटवाई, छटी, घोडा सटवाई या नावांनी ओळखली जाणारी ही मातृदेवता आहे तरी कोण?
या मातृकेशी विशिष्ट प्रकारचे नाते असलेल्या स्कंदाला ‘षष्ठीप्रिय’ म्हणतात. स्कंद म्हणजेच शिवपुत्र कार्तिकेय. काश्यपसंहितेप्रमाणे षष्ठी ही स्कंदाची बहिण आहे. स्कंद व विशाख हे तिचे दोन भाऊ. तर याऊलट ‘देवी भागवत पुराण’ व महाभारतानुसार ती स्कंदाची पत्नी आहे. इथे ती देवमेना या आणखी एका उपनावाने ओळखली जाते. सुश्रुतसंहिता षष्ठीला ‘रेवती’ हे आणखी एक नाव देते. कुषाणकाळातील एका मूर्तीमध्ये षष्ठी स्कंद आणि विशाख या दोघांमध्ये उभी असलेली दिसते. तिचे षष्ठी हे नाव सार्थक करणारी ही मूर्ती आहे. कारण या शिल्पात तिच्या खांद्यावर ओळीने पाच डोकी दिसतात. कुषाणकाळानंतर शिल्प क्षेत्रांत हा प्रकार लुप्त झाला. सटवाई देवी अनेक गावांची ग्रामदेवता आहे. हिच्या देवळाचे सहसा बांधकाम करीत नाहीत. फक्त आडोसा असतो. असे असले तरी गुप्त काळांत मात्र बांधकाम होत असल्याचे दिसते. स्कंदगुप्ताच्या काळातील एका लेखांत छंदक नावाच्या व्यक्तीने षष्ठीदेवीचे एक मंदिर बांधल्याचा उल्लेख आहे. याच काळात षष्ठीदेवीच्या नावाला धरून मुलांची नावे ठेवण्याची पद्धत होती. सन ५३२ मध्ये मध्यप्रदेशातील मंदसोर येथे कोरलेल्या यशोधर्मन उर्फ विष्णुवर्धन याच्या लेखांत ‘षष्ठीदत्त’ नावाची व्यक्ती आढळते, तसेच द्रोणसिंहाच्या भामोद्रामोहता ताम्रपटाचा क्षत्रक नावाचा लेखक ‘षष्ठीदत्तां’चा मुलगा होता. बंगाली लोकांत षष्ठीचरण हे नाव आज ही आढळते.
प्राचीन काळापासून या देवीला पुजले जात असले तरी पुरूषांचा तिच्या पूजेशी काही संबंध नसतो. षष्ठी-सटी-सटवी म्हणजेच शक्तीचे दुर्गा हे रुप मानले असले तरी लोकमताप्रमाणे ती अविवाहित आहे. ‘म्हसोबाला नाही बायको आणि सटवीला नाही दादला’ असे म्हटले जाते. याच कारणांमुळे ‘पाचवी-सटी’ या कार्यक्रमाच्या वेळेस पुरुषांची उपस्थिती टाळली जाते. परंतु कालांतराने जसे दगडी दिव्याची जागा धातूच्या दिव्याने घेतली, तसेच या ‘लेडीज स्पेशल’च्या कार्यक्रमात पुरूषांनीही शिरकाव केला. कोणत्याही कार्यक्रमाची सांगता ‘मांस-मद्या’शिवाय पूर्ण होऊ शकत नाही अशी श्रद्धा असणारा एक वर्ग या प्राचीन संस्कृतीला अर्वाचीन पद्धतीने साजरा करतोय. ‘अर्थ समस्या’ नावाची गोष्ट पाचवीलाच पुजलेल्या मुलींच्या पालकांसाठी ही नवी प्रथा अनर्थाकडे नेत आहे. यामुळे आधीच समस्यांच्या गर्तेत सापडलेल्या मुलीकडील लोकांना हा ‘जादाचा भुर्दंड’ बसतो. अर्थात संस्कृतीत घडणारे नवे बदल स्विकारायला हवेतच, पण हे बदल असंस्कृत नसतील याची काळजी घ्यायला हवी. या नव्या प्रथांना आवर घालायलाच हवा. देवी सटवाईच या नव्या प्रथाकारांच्या भाळी सद्बुद्धी लिहो, ही सदीच्छा!
- तुषार म्हात्रे , पिरकोन (उरण)
https://indraneelb.blogspot.com/2021/03/blog-post_91.html
कृष्ण आणि पुतना
लेख - १५
कृष्ण हे भारतीय धार्मिक परंपरेमध्ये असलेले असे चरित्र आहे ज्याने सर्वांना त्याच्या कथांमध्ये बांधून ठेवले आहे. बाळकृष्ण, यशोदेला प्रश्न विचारून भंडावून सोडणारा कृष्ण, गोपिकांबरोबर खेळणारा कान्हा, कंस वध करणारा जबाबदार तरुण कृष्ण आणि महाभारतात अर्जुनाचा सारथी होऊन आयुष्याचे आणि या सृष्टीचे तत्वज्ञान गीतेत संगणारा, विश्र्वरूप दर्शन देणारा भगवान श्रीकृष्ण. अशा अनेक वेगवेगळ्या रूपांमध्ये तो आपल्याला दिसतो. वेगवेगळ्या कलांमध्ये देखील कृष्णाची ही रूपं आपल्याला बघायला मिळतात. कृष्ण चरित्रतला महत्त्वाचा भाग म्हणजे त्याने बाळ असताना केलेला अनेक असुरांचा वध.
पुतना नावाच्या एका राक्षसिणीला कृष्णाचा वध करायला कंस मामाने पाठवले. आपल्या स्तनांना विषाने भरून ती यशोदेच्या घरात रूप बदलून आली. योग्य संधी साधून तिने कृष्णाला स्तनपान करायला घेतले. पण शेवटी दैवी अवतार असलेल्या कृष्णाने तिचे हे रूप ओळखून तिचा वध केला अशी ही कथा आहे.
मध्य प्रदेशात विदिशा जवळ बिजा मण्डल नावाचे एक प्रचंड मोठे पण भग्न मंदिर आहे. त्या मंदिराच्या एका खांबावर हे छोटेसे शिल्पं आहे. यामध्ये एक स्त्री आपल्या मांडीवर घेऊन त्या बाळाला स्तनपान करते आहे. स्तनपान हे मातृत्वाचे महत्त्वाचे लक्षण आहे. आपल्या बाळाला जवळ घेऊन, घट्ट पकडून ही क्रिया होते. पण या शिल्पामध्ये त्या स्त्री ने बाळाला स्तनपान देताना देखील आपले दोन्ही हात हे वर घेतले आहेत आणि हाच फरक आहे कलाकाराने दाखवला आहे.
एवढ्याश्या शिल्पातून एवढी मोठी कथा दाखवणाऱ्या कलाकाराचे कसब किती अगाध असेल याची आपण कल्पनाच केलेली बरी. कृष्ण आणि अनुषंगाने वैशव प्रभाव भारतात मोठ्या प्रमाणात वाढण्यात भारतीय कलांचे योगदान खूप मोठे आहे.
शिल्प - कृष्ण आणि पुटना
बिजा मण्डल, मध्य प्रदेश
९ वे शतक
इंद्रनील सदानंद बंकापुरे
कोल्हापूर
9960936474
शिव
लेख - २
शंकर किंवा शिव हा भारतात पुजल्या जाणाऱ्या महत्वाच्या देवतांपैकी एक अत्यंत महत्त्वाचा देव. या शंकराचे मूळ काही हजार वर्ष मागे जाते. अतिप्राचीन कालखंडात लिंग रूपाने पूजन होणारा देव, जनन आणि पुनर्निर्मिती दाखवणारा देव, वेदांमध्ये दिसणारा रुद्र, महायोगी शिव, सगळं काही आपल्या क्रोधाने नष्ट करणारा प्रलय आणि त्याच वेळेला परम भक्ताच्या मागण्या पूर्ण करणारा शिव, अशा शेकडो छटा या महादेवाच्या आहेत. स्मशानात अंगाला राख फासून राहणाऱ्या साधुंपासून ते तलम वस्त्र घालून राजवाड्यात राहणाऱ्या राजापर्यंत सगळ्यांना याने आपल्यात सामावून घेतले आहे. मंदिराच्या गर्भ गृहात प्रामुख्याने लिंग स्वरूपात याचे पूजन होत असेल तरीही शिल्पशास्त्रात शंकर या संकल्पनेवर मोठ्या प्रमाणात प्रयोग झाले आहेत.
शंकराच्या शिल्पामध्ये काही प्रमुख गोष्टी आपल्याला बघायला मिळतात. डोक्यावर असलेल्या जटा किंवा जटा मुकुट, कपाळावर कोरलेला तिसरा डोळा, हातात पकडलेला त्रिशूळ, शिवाला अत्यंत प्रिय असलेले वाद्य म्हणजेच डमरू, इत्यादी लांच्छने बघून शिवाचे शिल्प ओळखता येते.
आता या फोटोमध्ये असलेल्या शिवाचे निरीक्षण करूयात. आधी सांगितल्याप्रमाणे डावीकडून उजवीकडे असे निरीक्षण करायचे आहे. मूर्ती स्थानक म्हणजेच उभी आहे, हातामध्ये पकडलेला त्रिशूळ आणि त्या दंडाला खाली वेटोळे दिलेला नाग, कमरेवर नेसलेले वाघाचे कातडे (गुडघ्याजवळ वाघाचे तोंड दिसेल), डोक्यावर असलेला जटा मुकुट, पाठीमागे कोरलेली प्रभावळ किंवा वलय हे त्याच्या दैवत्वाचा पुरावा देतात.
लिंगपुराण, शिवपुराण, इत्यादी पुराणांमध्ये शंकराच्या कथा आपल्याला वाचायला मिळतात. वेदांमध्ये छोट्या प्रमाणात दिसणारा रुद्र ते पौराणिक कालखंडात प्रमुख देव म्हणून दिसणारा शिव हा प्रवास खरंच अद्भुत आहे.
मूर्ती - केवल शिव, छत्रपती शिवाजी महाराज वास्तू संग्रहालय, मुंबई
इंद्रनील सदानंद बंकापुरे
कोल्हापूर
9960936474
नवरात्र हा सण देवी दुर्गेचा!! महिषासूर नावाच्या म्हशीच्या तोंडासारख्या राक्षसावरील मिळवलेल्या विजयाचा उत्सव म्हणून साजरा केला जातो.
आख्यायिकानुसार
राक्षसांच्या वाढत्या अत्याचारांचा नाश करण्यासाठी समस्त देवतांनी दुर्गेची निर्मिती केली. ह्या आगाऊ
महिषासुराने तिच्याशी लग्न करण्याची इच्छा व्यक्त केली. पण दुर्गेने लग्न करण्याआधी एका युद्धामध्ये स्वतःला हरवण्याची अट महिषासुराला घातली. इथेच फसला तो.... हे युद्ध ९ दिवस आणि ९ रात्र चालले होते. दहाव्या दिवशी दुर्गा देवीचा विजय झाला!
तेव्हापासूनच
उत्तरेपासून दक्षिणेपर्यंत पूर्वेपासून पश्चिमेंपर्यँत देवी सामर्थ्य व शौर्याचप्रतीकच झालेली दिसते!
महिषातकरी येन पूजिता स जगतप्रभूं.... अर्थात ज्याने महिषासुरमर्दिनी ला पूजिले तो जगाचा स्वामी होतो...! हे ही रूढ झाले असेल... बऱ्याचदा पूजेअंती/ युद्धविजयप्राप्ती करिता तत्कालीन वीरराजे महाराजे महिषासुरमर्दिनीला म्हशीं/रेड्याचाच बळीसुद्धा देत!!!
याचे काल्पनिक का असेना पण उदाहरण म्हणून अगदी अलीकडील बिग बजेट असलेल्या बाहुबली चित्रपटाचे देता येईल😎 यात भल्लाळदेव युद्धाच्याप्रारंभी एक घाव दोन तुकडे करत महाकाय रेड्याचा कार्यक्रम करतो....
तर त्यांचाच भाऊ बाहुबली आधुनिकप्रगल्भते चा दाखला देतांना प्राणिप्रेम व्यक्त करत अवघ five ml blood sample देत रेड्याला जीवदान देतो!🤣🤣😂😂(हे पाहून त काही जणांनी बाहुबली ला देशद्रोही, सेक्युलर,पुरोगामी ही ठरविले असेल🙉🙊🙈)
असो...
थोडक्यात सांगायचे झालं तर राज्य,राजवट कुठलीही असो...
चौल-चालुक्य असो की होयसळ...
चंदेल असो की परमार...
राष्ट्रकूट असो की यादव....
देवीचं महिषासुरमर्दिनी स्वरूप हे प्रचंड लोकप्रिय होतं...
म्हणूनच आजही त्या त्या राजवटीच्या अस्तित्वातच्या ठिकाणी महिषासुरमर्दिनी च देखणं रूप शिल्प/मूर्ती रुपात आपल्याला दर्शन देते म्हणजे देतेच! आपल्या देशातलं कुठलंही म्युझियम महिषासुरमर्दिनीच्या मूर्ती शिवाय अपूर्णच म्हणावं लागेल! तर काही ठिकाणी पूर्णपणे झीज झालेल्या मूर्ती ही दिसतील, बरं ह्या ओळखन ही अगदी सोपं आहे ४ ते १० हात, प्रत्येक हातात काहींना काही शस्त्र आहेच,
पायथ्याशी चिरफाड झालेला महिषासुर त्याच्या बाजूला दुर्गेच वाहन आक्राळ विक्राळ सिंह.... बस ऐवढंच,....
शेवटी जाता-जाता...बरं त्या सर्वच हातात शस्त्रच आहे...ऐकाही हातात ती दांडिया ची टिपरी नाहीये त्यामुळे ते हल्ली आडमाप मेकअप करून दांडियाचा धांगडधिंगा कुठून आला माहिती नाही!!
🤦🏽♂️🙈🙊🙉
नवरात्रोत्सवाच्या मनस्वी शुभेच्छा....
⛳🛕🐾🐅🌳✍🏾निखील...
किर्तीमुख.....
🦑🦑🦑 किर्तीमुख🦑🦑🦑
आपले मंदिरे नुसती बांधायची म्हणून अजिबात बांधलेली नाहीत, मंदिर कुठलंही बघा त्यामागे मंदिराची रचना, स्थान, भौगोलिक स्थिती या सर्वांचा जबरदस्त मेळ घालुनच ते बनविलेले असते, त्यावर असलेल्या प्रत्येक शिल्पाकृतीचाही काहींना काही अर्थही नक्कीच असतो... पण माहिती अभावी आज मात्र कशाचा कशालाच ताळमेळ नसतो... आणि म्हणून अनावधानाने त्या-त्या शिल्पाचे, मूर्तीचे नुकसान ही होत असते,आता हेच बघा ना
तुम्ही मंदीरात गेल्यावर मंदिरांच्या प्रवेशव्दारापाशी एक राक्षसाच्या तोंडासारख एक शिल्प कोरलेले असंत.
या शिल्पाला “किर्तीमुख” अस म्हणतात. हे किर्तीमुख मंदिराच्या प्रवेशव्दारापाशी ठेवण्या मागच्या दोन प्रचलित पौराणिक कथा आहे.त्यातील पहिली.....
जालंधर नावाचा एक राक्षस होता. तो महादेवाचा मोठा भक्त होता त्याला प्रचंड भुक लागायची. कितीही खाल्ले तरी त्याची भुक कधी संपायची नाही. अश्याही स्थितीत त्याने घोर तपश्चर्या केली.
महादेव प्रसन्न झाले....
बोलले....काय पाहिजे...???
जालंधर न मागून-मागून मागितल तरी काय, त भूक लागली खायला द्या😂😂
महादेवाने त्याला स्वत:च शरीर खायला सांगितले,त्याने पायापासून खायला सुरवात केली उरलं फक्त तोंड आणि डोकं...तरीही त्याची भूक संपली नाही....! देवा अजून भूक लागली...म्हटल्यावर भोळ्याशंकराने मस्तपैकी स्माईल देऊन त्याला जालीम उपाय सांगितला...की जिथं जिथं मी असेल... तिथं तिथं माझ्या दारात येऊन बस आणि येणार्या सर्वांची पाप खाऊन टाक...!!!
न संपणारा भंडारा आहे तो...
कितीही खाय...तुला ती कधी कमी पडणार नाही.🤣🤣
आणि म्हणून या किर्तीमुखाच शिल्प मंदिरा च्या दारात कोरण्याची प्रथा रुढ झाली !!
कथा दुसरी.....
एकदा पार्वतीच्या सौंदर्याची महती ऐकून महा शक्तिशाली जलंधर राक्षसाने पार्वतीस लग्नाची मागणी घालण्यास राहू ला आपला दूत म्हणून पाठवले. राहू कैलासावर गेला, आणि त्याने जलंधरासाठी पार्वती ला मागणी घातली. हे ऐकून संतापलेल्या महादेवाच्या तिसऱ्या डोळ्यातून एक भीषण आक्राळविक्राळ प्राणी तयार झाला, आणि तो राहूवर धावून गेला. त्या प्राण्यांचे महाभयंकर रूप पाहून राहूची चिक्कार फाटली...! मग करेल तरी काय... त्याने महादेवाच्या पायावर डोकं ठेवल...! त्यामुळे महादेवाने राहूला माफ केले. राहू तिथून निघून गेल्यावर महादेव परत ध्यानस्थ झाले.
पण बाहेर आलेल्या प्राण्यांची भूक वाढत होती. त्याने महादेवाला विचारले, मी खाऊ तरी काय? महादेवांनी सांगितले, की खा स्वतःलाच.... देवाधिदेव महादेवाची चा हुकूम सर आखोंपर मानून ह्या प्राण्यांने स्वतः ला पायापासून खायला सुरवात केली आणि खात खात त्याचे फक्त डोकेच उरले. तरीही त्याची भूक भागली नाही. महादेवाचे ध्यान संपल्यानंतर त्यांना दिसले ते फक्त त्याचे डोके!!🦑 पहिला प्रश्न देवा भूक लागली😂😂
या खाऊगिरी वर महादेव जाम खुश झाले. त्यांनी त्या डोक्याला नाव दिले कीर्तिमुख आणि काम ही दिलं.... तेच पाप खायचं✨
ह्या जगात कधीही न संपणारी गोष्ट म्हणजे मनुष्याचे पाप,अमर्याद अशी भूक लागलेल्या किर्तीमुखाला देवाने काम दिले भक्तांची पापं खाण्याचे.!!!
ऐकंदरीत दोन्ही कथा मिळत्या-जुळत्या...!!!
व आशय ही सारखाच....
फक्त महादेवच नाही... तर मंदिर कुठलही असो आता हा दिसतो म्हणजे दिसतोच!!!
जागा मात्र कधी-कधी बदलत असतो...कधी मंदिराच्या शिखरावर...कधी मूर्ती मागच्या प्रभावळीवर....कधी प्रवेशद्वारच्या वर....
जागा कुठंही असो पण काम आपलं तेच पापखायच...
असा हा कीर्तिमुख🦑✨
हल्लीच्या काळात यांच्यावरही बेरोजगारी च संकट आलं आहे....
कारण आपले येडे अंधभक्त🤦🏽♂️.....!!!याच्यावर पाय ठेवून मंदिरात जाण्याऐवजी यालाच ऑइल पेंट मारत आहे...कुणी पेढा खाऊ घालत आहेत...कुणी हळदी-कुंकू खाऊ घालत आहेत... तर कुणी याच्यावर बेलफुल टाकून बुजवून टाकत आहेत ह्याला....!!!🙈🙉🙊
हे टाळायला पाहिजे🙏🏽🙏🏽
कदाचित याचमुळे तो सध्या जरा नाराज दिसतो...🙃🙏🏽
वरच सर्व दोन-तीन वेळा वाचलं की तुम्ही कुठल्याही प्राचीन मंदिरात जा... तुम्हांला किर्तीमुख दिसलाच म्हणून समजा...😊
(📸फोटू:-हिंडून फिरून मीच काढलेले आहेत)
✍🏾निखील
आदिशक्ती महादेवी
नवरात्र उत्सवानिमित्त इथल्या काही लेण्या, मंदिरांतून टिपलेली आदीशक्तीची ही काही रूपं.
सुरुवात करूयात ती वैदिक कालखंडाच्याही आधीपासून असलेल्या स्त्री शक्तींपासून.
लज्जागौरी
लज्जागौरी ही स्त्रीच्या प्रजनन शक्तीचे प्रतिक. वैदिक कालखंडाच्याही अगोदरपासून अशा मूर्ती प्रचलित होत्या. वैदिक कालखंडात ह्या प्रकारच्या मूर्ती तंत्रमार्गात समाविष्ट झाल्या. मुख्यतः ह्या मूर्तींना मस्तकाच्या जागी कमळ असते. तर काही वेळा ह्या मस्तकासह असतात. ह्या नग्न असून उपड्या बसलेल्या स्थितीत असतात. ह्या मूर्तींच्या अशा स्वरूपामुळेच ह्यांचे नष्टचर्य ओढवले. परकिय आक्रमकांबरोबरच स्वकीयांनीही ह्यांना नष्ट केले.
१. ही पेडगावच्या भैरवनाथ मंदिरातील लज्जागौरीची प्रतिमा. इ.स. साधारण १३ वे शतक. यादव राजवट.
हिच्या योनीतून दोन सर्प बाहेर आले असून ते पुरुष शक्तीचे प्रतिक आहेत.
२. ही वेरूळमधली रामेश्वर लेण्यातील (लेणी. क्र. २१ ) येथील नंदीपीठाच्या मागील बाजूस कोरलेली आहे. इ.स. ७ / ८ शतक.
सप्तमातृका
ब्राम्ही माहेश्वरीचैव कौमारी वैष्णवी तथा।
वाराही च तथेंद्राणी चामुंडा: सप्तमातरः॥
सप्तमातृका मूळाच्या अनार्य देवता. कोकणात ह्यांनाच साती आसरा अथवा
जलदेवता म्हणत असावेत. सृजनशक्तीची ही प्रतिकं. यातल्या ब्राह्मी, कौमारी,
ऐन्द्राणी आणि वैष्णवी ह्या वैदिक अंश असलेल्या तर माहेश्वरी, वाराही,
चामुंडा ह्या मूळच्या अवैदिक अर्थात अनार्य अंशाच्या. काही वेळा सात
मातृकांबरोबरच आठवी नारसिंहीही दिसते.
सप्तमातृका ह्या नेहमी पट ह्या स्वरूपात दिसतात. म्हणजे सुरुवातीला वीरभद्र
आणि शेवटी गणेश आणि मध्ये सात मातृका त्यांच्या बाळांसह. मातृका ओळखणे तसे
फार सोपे. मातृकांखालीच प्रत्येकीची वाहने कोरलेली असतात.
ब्राह्मणी - हंस
माहेश्वरी - बैल
कौमारी - मोर
वैष्णवी - गरूड
वाराही - वराह किंवा महिष. ही काही वेळा वराहमुखी पण दाखवली जाते.
ऐन्द्राणी - हत्ती
चामुंडा - प्रेत, शृगाल, कुत्रा किंवा घुबड
यातली चामुंडा सर्वात सुप्रसिद्ध. कदाचित चालुक्यांची ती कुलदेवता असल्याने तीला मानाचे स्थान मिळालेय. कंकालस्वरूप शरीर, लोंबलेले स्तन, पोटात असलेला विंचू (हे तिच्या सतत जागृत असलेल्या भुकेचे प्रतिक) आणि पायांतळी प्रेत ही तिची सर्वसाधारण लक्षणे. सप्तमातृकापटांसह ही एकच मातृका स्वतंत्ररीत्या कोरलेलीही बर्याच वेळा आढळते.
वेरूळच्या 'रावण की खाई' (लेणी क्र. १५) मधील सप्तमातृका पट
३. ब्राह्मणी, माहेश्वरी, कौमारी, वैष्णवी अनुक्रमे हंस, बैल, मोर आणि गरूड ह्या वाहनांसह
४. वाराही, ऐन्द्राणी आणि चामुंडा अनुक्रमे वराह, हत्ती आणि घुबड ह्या वाहनांसह
वेरूळ येथील कैलास एकाश्ममंदिरातील यज्ञशाळेतील सप्तमातृका
५. वीरभद्र (नंदी), ब्राह्मणी (हंस) आणि माहेश्वरी (बैल)
६. कौमारी आणि वैष्णवी अनुक्रमे मोर आणि गरुडासह
७. वाराही (महिष), ऐन्द्राणी (हत्ती) आणि चामुंडा (शृगाल अथवा कुत्रा)
८. सप्तमातृकापट कोपेश्वर मंदिर, खिद्रापूर
९. पूर्णपणे उभ्या स्थितीतील सप्तमातृकापट, वेरूळ
१०. चामुंडा, सोमेश्वर मंदिर, पिंपरी दुमाला (१३ वे शतक)

११. चामुंडा, भुलेश्वर मंदिर, यवत (१२ -१३ वे शतक)
१२. चामुंडा, कोपेश्वर मंदिर, खिद्रापूर (११-१२ वे शतक)
१३. खिद्रापूरच्या कोपेश्वर मंदिरातीलच अजून एक देखणी चामुंडा
सप्तमातृकांसोबतच नंतरच्या काळात गणेशाचे स्त्रीरूपसुद्धा तंत्र पंथात समाविष्ट झाले. विनायकी अथवा गणेशिनी ह्या नावाने हे रूप ओळखले जाते.
१४. पाटेश्वर येथील विनायकी, साधारण १४ वे शतक

१५. भुलेश्वर येथील विनायकी
सरिता देवता
भारतात नद्यांनासुद्धा देवता मानले जाते. गंगा, यमुना आणि सरस्वती ह्या तीन प्रमुख सरिता देवता. ह्या आपल्याला वेरूळ येथे कोरलेल्या दिसतात. गंगेचे वाहन मकर, यमुनेचे कूर्म तर सरस्वतीचे कमळ
१६. मकरारूढ गंगा
१७. कूर्मारूढ यमुना
१८. कमलारूढ सरस्वती
१९. वेरूळ येथील रामेश्वर लेणीतील (क्र. २१) गंगेचे अप्रतिम शिल्प
२०. यमुना, धुमार लेणे (लेणी क्र. २९), वेरूळ
पार्वती
बहुतेक वेळा पार्वतीची मूर्ती ही उमा-माहेश्वर अशा स्वरूपात आढळते.
स्वतंत्रपणे कोरलेल्या तीच्या अगदी मोजक्या मूर्ती आढळतात. पार्वतीचे वाहन
गोधा अर्थात घोरपड, पार्वतीच्या भोवती पाच अग्नी दाखवतात. ४ यज्ञकुंडातले
अग्नी आणि पाचवा सूर्य. शंकर हा पती म्हणून प्राप्त करण्यासाठी तीने
पंचाग्नीसाधन करून कठोर तप केले अशी पौराणिक कथा.
२१. वेरूळ येथील लंकेश्वर लेणीतील पार्वती. लक्षपूर्वक पाहिल्यास पार्वतीच्या एका हाती गणेश तर दुसर्या हाती शिवपिंडी दिसेल. भोवती अग्नी धगधगत असलेले दिसतील, वाहन गोधा
२२. पार्वती, धुमार लेणे (लेणी क्र. २९), वेरूळ
अन्नपूर्णा
हे ही देवीचेच एक स्वरूप. पार्वतीचा अवतार. आपल्या घरी अन्नपूर्णा सौख्य
आणि समृद्धी घेऊन येते अशी समजूत. तिची सर्वसाधारण लक्षणे म्हणजे एका हातात
पळी तर दुसर्या हाती कणीस, तर कधी कमंडलू. खिद्रापूरच्या मंदिरात
अंतराळाच्या भिंतीत अन्नपूर्णेची पळी हातात घेतलेली एक सुरेख मूर्ती आहे.
दुर्दैवाने माझ्याकडील ते छायाचित्र खराब झाले.
२३. वेरूळच्या कैलास एकाश्ममंदिरातील प्रदक्षिणापथाच्या भिंतीत कोरलेली अन्नपूर्णा
लक्ष्मी
लक्ष्मी म्हणजे धनाची देवता. हिंदू धर्मात ती कोठून आली हे विवाद्य आहे. काही जण ती जैन तर काही जण ती बौद्ध धर्मातून आली असे मानतात तर बरेच जण ती मूळची हिंदू धर्मातीलच असे मानतात. माझ्यापुरते मी ती सप्तमातृकांतील वैष्णवीतून उत्क्रांत झाली असावी असे मानतो.
लक्ष्मीचे सर्वपरिचीत स्वरूप हणजे गजान्तलक्ष्मी.
सरोवरातील कमळपुष्पावर आरूढ लक्ष्मीला दोन गजांकडून जलाभिषेक होत आहे हे तिचे स्वरूप.
२४. गजान्तलक्ष्मीचे सर्वात सुंदर रूप वेरूळ येथे शिल्पांकित केलेले आहे.
२५. गजान्तलक्ष्मी, कोपेश्वर मंदिर, खिद्रापूर
२६. गजलक्ष्मी, रावण की खाई (लेणी क्र. १५)
२७. लक्ष्मी, यज्ञशाळा, कैलास लेणे, वेरूळ
दुर्गा
हे शक्तीचे सर्वात सुप्रसिद्ध स्वरूप. हिचे वाहन सिंह. आदिशक्तीने निरनिराळी रूपे घेऊन राक्षसांचा संहार केला. पैकी महिषासुराचा वध करणारी ती दुर्गा अथवा महिषासुरमर्दिनी. हिला ८, १०, १६ किंवा १८ हात दाखवतात. हिची आयुधे म्हणजे ढाल, तलवार, त्रिशूळ, धनुष्य, अंकुश, बाण, मुंड, अक्षमाळा, दंड, शंख, पद्म, चक्र, परशु. पैकी चक्र हे विष्णूकडून तर त्रिशूळ हे शंकराकडून तिला मिळाले असे मानतात. दुर्गेची रूपे केवल दुर्गा व महिषासुरमर्दिनी अशा दोन्ही स्वरूपात दिसतात. केवल दुर्गा म्हणजे सिंहारूढ असणारी दुर्गा तर महिषासुरमर्दिनी ह्या रूपात ती महिषाचा संहार करताना दाखवली जाते.
आता दुर्गा व महिषासुरमर्दिनीची विविध रूपे पाहूयात.
२८. दुर्गा, यज्ञशाळा, वेरूळ
२९. दुर्गा, रावण की खाई (लेणी क्र. १५) वेरूळ
३०. दुर्गा, सिद्धेश्वर मंदिर, कायगाव टोके (१८ वे शतक)
३१. महिषासुरमर्दिनी, कैलास लेणे वेरूळ, येथे महिष राक्षस स्वरूपात दाखवलाय तर त्याचे महिष असणे हे डोक्यावरील दोन शिंगांद्वारे सूचित केलेय.
३२. महिषासुरमर्दिनी, कैलास लेणे, वेरूळ
३३. महिषासुरमर्दिनी, रामेश्वर लेणे, लेणी क्र. २१, वेरूळ
३४. महिषासुरमर्दिनी, कोपेश्वर मंदिर, खिद्रापूर
३५. महिषासुरमर्दिनी, भुलेश्वर मंदिर, यवत
३६. महिषासुरमर्दिनी, चांगावटेश्वर मंदिर, सासवड, १३ वे शतक
आतापर्यंत ढोबळमानाने आपण काही रूपे अगदी संक्षिप्त स्वरूपात पाहिली. भैरवी, सरस्वती, हरिती, ज्येष्ठा गौरी, अंबिका अशी अजूनही काही रूपे आहेत त्यावर परत कधीतरी.
छान, लेख आणि फोटोंच्या निमीत्ताने नवरात्रात देवींच दर्शन सोबत इतिहासाच जरास ज्ञान मिळण्याचा योग धन्यवाद. अशात मराठी विकिवरील गौरीपूजन लेखाच्या निमीत्ताने जरा गूगल शोध झालेलाच आहे तर या निमीत्ताने काही शंकांची माहिती अनुषंगिक विषयांतराचा भाग म्हणून कुणी देऊ शकल्यास हवी आहे.
१) सबंध भारतात मिळून किमान ९ प्रकारच्या गौरीपूजनाच्या परंपरा आढळल्या त्या खालील प्रमाणे
*विवीध गौरी आणि त्यांची व्रते:
**ज्येष्ठा गौरी
**करवा चौथ - हे गौरी गणेशाशी संबंधीत व्रत असण्याबद्दल दुजोरा हवा
**जयपार्वती व्रत - आषाढ महिन्यातील गूजराथेतील व्रत - अधिक माहिती हवी
**स्वर्णगौरी व्रत - शुक्ल तृतीया भाद्रपद (गणेश चतुर्थीच्या आधीचा दिवस - कर्नाटक - अधिक माहिती हवी
**चैत्र गौरी - अधिक माहिती हवी
**सौभाग्य गौरी व्रत - आंध्रप्रदेश - अधिक माहिती हवी
**मंगळा गौरी - अधिक माहिती हवी
**केदार गौरी व्रत -तामीळनाडू - अधिक माहिती हवी
**ललिता गौरी - अधिक माहिती हवी
**लज्जा गौरी -
१ अ) लज्जा गौरीचे पूजन होत होते असे इतिहास विषयक लेखांवरून वाटते या पूजनाचे आणि व्रताचे नेमके स्वरूप काय होते;
१ आ) लज्जागौरीचा आणि इतर गौरी पूजन प्रथांचा आपापसात काही संबंध आहे का ?
१ इ) भारत भरातील सर्व गौरी पूजने परस्परांशी संबंधीत असतील तर हे संबंध नेमके कोणते आणि हि सर्व प्रकारची गौरी पुजने वेगवेगळ्या दिवशी होण्याची कारणे काय असावीत
१ उ) ज्येष्ठा गौरींच्या बाबतीत गौरी आणि महालक्ष्मी हि दोन्ही नावे प्रचलीत दिसतात; बर्याच ठिकाणी गौरी हे पार्वती स्वरूप असल्याचे उल्लेख येतात तर लक्ष्मी ही विष्णू पत्नी मानली जाते तर यात काही सरमिसळ/ गल्लत होते आहे का ?
लज्जागौरीचे पक्षी योनीदेवतांचे / मातृदेवतांचे पूजन वैदिक काळाआधीपासून होत होते. डेक्कन कॉलेजातील ताम्रपाषाण विथिकेमध्ये इनामगाव उत्खननात मिळालेल्या स्त्री देवतेची मातीपासून तयार केलेली मूर्ती (टेराकोटा) आहे जी मी स्वतः पाहिली आहे. डेक्कन कॉलेजच्या संग्रहालयातील विथिंकेवर कधीतरी धागा काढण्याचा विचार आहे.
लज्जागौरी वर रा. चिं. ढेरे यांनी याच नावाचे एक पुस्तक लिहिले आहे त्यात आपल्या सर्व प्रश्नांची उत्तरे बहुधा मिळतील. मी ते पुस्तक वाचलेले नाही, संग्रहीपण नाही. पैसाताई अधिक माहिती देऊ शकेल.
बाकी गौरी म्हणजे पार्वती. शुभ्र हिमालयाची ती मुलगी म्हणून गौरी हे नाव.
प्रेतसंस्था तु चामुण्डा वाराही महिषासना
ऐन्द्री गजसमारूढा वैष्णवी गरुडासना
माहेश्वरी वृषारूढा कौमारी शिखिवाहना
श्वेतरूपधरा देवी ईश्वरी वृषवाहना
ब्राह्मी हंससमारूढा सर्वाभरणभूषिता
लज्जागौरी प्रतिमेतिल सर्प पुरुष शक्तीचे प्रतिक कसे ?
लज्जागौरी प्रतिमेतीलच असे नव्हे तर एकूणांतच हिदू मिथकांत सर्पांना प्रजननाचे प्रतिक (symbol of fertility) मानले गेले आहे. ह्याशिवाय येथे सर्प योनीतून बाहेर आले असून स्त्रीने ते धरून ठेवले आहेत. साहजिकच ते पुरुष शक्ती दर्शवत असावेत.
थोडा आणखी विदा हवा कारण स्त्रियांना फर्टिलिटी सीमबोल/गॉड असे म्हटले जाते अर्थात ही अनार्याची वा जेंव्हा देव न्हवते तर निव्वळ निसर्ग दैवत गणला जात होता त्याकालीन बाब आहे आणि लज्जा गौरी जर अनार्या-अवैदिक असेल तर ती स्वत:च सिम्बोल ऑफ़ फर्टिलिटी ठरते व पुरुष हां होर्न गॉड ऑफ़ हंटिंग म्हणजेच शिंग असलेला शिकारिचा देवता ठरतो. पुरूषाचे हे शिंग चित्र व मूर्तिमधे प्रामुख्याने डोक्यावर दाखवलेले असे आणखी कुठे नाही :)
म्हणून एकाच ठिकाणी दोन दोन साप ही कलात्मकता नसून इतर काही दर्शवत असावेत असा संशय उरतो
अजून विदा काहीच नाही. मूळात ही प्रतिमा बर्याच उशिरा घडवली गेली आहे. यादवकाळात, साधारण १३ व्या शतकात. तेव्हा लज्जागौरीच्या प्रतिमा घडवणे जवळपास बंद झाले होते शिवाय त्या काळात आर्य-अनार्य, वैदिक- अवैदिक लागू होण्याचा काही प्रश्नच नाही
लज्जागौरी: हे स्त्रीच्या जननशक्तीचे देवतास्वरूप आदिम काळापासून जवळपास सर्व जगभर मानले गेलेले. रेणुका, यल्लम्मा, एकवीरा, जोगुळांबा, सांतेरी ही सगळी एकाच मातृशक्तीची रूपे मानली गेली आहेत. सांतेरी ही वारूळस्वरूपात पुजली जाते. वारूळ ही भूमीची योनी तर नाग हा पुरुषतत्त्वाचे प्रतीक मानला गेला. मुरुगन, खंडोबा, जोतिबा, रवळनाथ, भैरव हे क्षेत्रपाल त्यामुळे नागरूप मानले जातात. वारूळ आणि नाग हे स्त्री-पुरुष मीलनाचे आणि जननशक्तीचे प्रतीक ठरले. वारुळात रहाणारा नाग लज्जागौरीच्या शिल्पात का असावा त्याचं हे कारण आहे.
http://www.misalpav.com/node/25606 या धाग्यावरील प्रतिसादात काही माहिती लिहिली होती. ती इथे पेस्ट करीत आहे.
आसरा हा शब्द अप्सरा यावरूनच आला आहे. आणि मूळ मातृकांनाच लोकव्यवहारात
साती आसरा हे नाव मिळाले. नुकतेच पं महादेवशास्त्री जोशी यांचे "भारताची
मूर्तीकला" हे पुस्तक हाती आले आहे. त्यात ते म्हणतात की या मातृका म्हणजे
ब्रह्मा, शिव, स्कंद, विष्णू, यम, इंद्र, रुद्र यांच्या क्रियाशक्ती आहेत.
त्या आपापल्या स्वामींचीच आयुधे व वाहने धारण करतात. या ७ जणींत
महालक्ष्मीचा अंतर्भाव केला की त्या अष्टमातृका होतात. काही लोक
महालक्ष्मीच्या जागी योगेश्वरी किंवा चर्चिका यांची स्थापना करतात.
ब्राह्मी माहेश्वरी चैव कौमारी वैष्णवी तथा |
वाराही च तथेन्द्राणी चामुंडा सप्तमातरः ||
असा त्यांचा उल्लेख असलेला श्लोक आहे.
या सप्तमातृकांच्या रक्षणासाठी एका बाजूला वीरभद्र तर दुसर्या बाजूला गणपती असतो. या सार्या वर्णनावरून त्या मूळ अनार्यांच्या देवता असाव्यात हे स्पष्ट आहे. या मुलांचे रक्षण करणार्या मातृका आहेत तशाच "बालघातिनी माता" सुद्धा वर्णन केल्या आहेत. त्यांच्यात पूतना चे नाव आहे. त्यावरून साती आसरांनी पाण्यात ओढून नेले किंवा कोणाचा बळी मागितला इ. कहाण्या प्रचलित झाल्या असाव्यात.
प्रत्येक मातृकेचा एक प्रिय वृक्ष असतो पाणवठ्याजवळ किंवा डोंगरकपारीत मातृकांची स्थाने असतात.विवाह वगैरे मंगलकार्यात सुपार्या मांडून मातृकापूजन करतात. तसेच सुलभ प्रसूतीसाठीही मातृकापूजन केले जाते. उत्तर भारतात या मातृका १६ मानल्या गेल्या आहेत. आणि तिकडे मातृकापूजन जास्त लोकप्रिय आहे.
स्त्रीरूपी गणेश/विनायकीबद्दल ढेरे म्हणतात की लक्ष्मीची मोठी बहीण म्हटलेली अलक्ष्मी (ज्येष्ठा) हिचे रूप विनायकाप्रमाणेच (गजमुख, लंबोदर इ.)वर्णन केले आहे. अलक्ष्मीचे सर्व गुण लक्ष्मीच्या उलट सांगितले आहेत. गणेश हा जसा विघ्नकर्ता आणि नंतर विघ्नहर्ता मानला गेला तशीच लक्ष्मी आणि अलक्ष्मी ही एकाच देवतेची द्वंद्वात्मक रूपे आहेत. अलक्ष्मी विघ्ने आणणारी देवता मानली गेली आहे. तशीच बालघातिनी सप्तमातृकांमधीलही एक मातृका मानली गेली आहे. उद्दालक मुनीने तिच्याशी विवाह करून तिच्या अशुभ आवडी पाहून तिचा त्याग केला अशी एक कथा आहे. गणेशाचे एक नाव ज्येष्ठराज आहे. तर लक्ष्मीबरोबर गज हे असतातच. अशा गजान्तलक्ष्मीचे चित्र दाराच्या पट्टीवर कोरण्याची पद्धत होती. असा हा लक्ष्मी, ज्येष्ठा आणि गणेश यांचा परस्पर संबंध आहे. या शिल्पांमध्ये मुळात कदाचित या अलक्ष्मीला स्थान दिलेले असावे. जे काळाच्या ओघात स्त्रीरूप गणेश असे मानले गेले.
विष्णु, महेश इ. देवांना त्यांची रूपे आणि गुण बहुधा गुप्तकाळात मिळाले. तशाच मातृकांनाही गुप्तकाळात सध्याची नावे आणि गुण शिल्पे तयार करण्यासाठी म्हणून दिले गेले असावेत. मातृकापूजा ही त्याच्याही फार आधीची. वेगळ्या नावांनी आणि मुख्यतः बालघातिनी स्वरूपात, त्यांनी मुलांचा घात करू नये म्हणून त्यांची पूजा आदिम काळापासून केली जात होतीच. आधीच्या काळात पूतना, षष्ठी, शकुनी, ज्येष्ठा (दु:सहा) शीतला, मातंगी इ मातृकांची नावे होती. स्कंद हा मातृकांचा पुत्र आणि मुळात तोही बालग्रह मानला गेला होता. नंतरच्या काळात त्यांच्या भीतीने पूजा करायचा रिवाज विसरला गेला आणि त्यांना आताचे वरद रूप मिळाले.
अशी काही शिल्पे आहेत का की शिल्प कालावधी आधीचा असण्याची शक्यता असेल आणि संस्कृतातील मिथक रचनेचा संभाव्य काळ नंतरचा असेल. जाणून घेण्याचा उद्देश हा की काही लोककथा संस्कृत मिथकांनी दखल घेण्या पुर्वी पासूनच्या असू शकतील का ? कारण असंख्य भारतीय शिल्पातून अॅक्रॉस इंडीया प्रतिकांचा नेमकेपणा काटेकोरपणे जपला गेला असावा असे वाटते. ज्या काळात चित्रकलेसाठी कागदासारखे एका ठिकानाहून दुसर्या ठिकाणी चित्र नेण्याचे चांगले माध्यम नव्हते. संस्कृत जाणणार्या प्रत्येकाला स्वतःला शिल्पकला येत नसेल आणि शिल्पकला येणार्या प्रत्येकाला संस्कृत येत नसेल. एकच शिल्पकार कितीही म्हटले तरी त्या काळात अडवळणाच्या जागी जाऊन किती लेण्यांचा अभ्यासकरून लक्षात ठेऊन पुन्हा दुसर्या जागी जाऊन सेम टू सेम प्रतिकांची शिल्पे बनवणार.
अर्थात मातीच्या अथवा दगडाच्याही ट्रांसपोर्टेबल छोट्या छोट्या प्रतीमा बनवून दुसर्या शिल्पकारांना डेमोसाठी म्हणून उपलब्ध केल्या जाण्याची तुरळक शक्यता असू शकेल पण तसे असेल तर तसा उल्लेख कुठे मिळतो का ?
अशी काही शिल्पे आहेत का की शिल्प कालावधी आधीचा असण्याची शक्यता असेल आणि संस्कृतातील मिथक रचनेचा संभाव्य काळ नंतरचा असेल
तशी बरीच आहेत. मुख्यतः अवैदिक शिल्पे उदा. गणेश वगैरे. अर्थात ही शिल्पे घडवली गेली तदनंतर. पण काही उत्खननांत हत्ती मुखाची टेराकोटा शिल्पे आहेत. शिवाय योनी, लिंग आदी जननशक्तीसंदर्भातही बरीच शिल्पे सिंधू खोरे, राखीगढी, इनामगाव,, नेवासा इथल्या उत्खननांमध्ये मिळाली आहेत. अशा प्रकारची शिल्पे नंतर वैदिकांमध्येही समाविष्ट झाली.
अर्थात मातीच्या अथवा दगडाच्याही ट्रांसपोर्टेबल छोट्या छोट्या प्रतीमा बनवून दुसर्या शिल्पकारांना डेमोसाठी म्हणून उपलब्ध केल्या जाण्याची तुरळक शक्यता असू शकेल पण तसे असेल तर तसा उल्लेख कुठे मिळतो का?
तसे काही उल्लेख नाहीत पण एकंदरीत मौर्यकालीन शिल्पकलेवर ग्रीक, रोमन शैलीचा मोठा प्रभाव होता. संस्कृतींचे आदानप्रदान व्यापारानिमित्ताने इकडून तिकडे होत राहिल्यामुळे शिल्पशास्त्रातही तदनुषंगाने बदल घडत गेले.
गजहा - शिवाची रौद्र आणि संहारक रूपातली मूर्ती.
.http://www.chaturthamiti.in/2022/10/blog-post.html
विष्णु की प्रतिमाएं
जौनपुर
22-07-2020 08:36 PM
द्रिश्य 3 कला व सौन्दर्य
भारतीय कला में मूर्तियाँ अत्यंत ही महत्वपूर्ण हैं, इन मूर्तियों में
अनेकों देवी देवताओं आदि का अंकन किया गया है जिसमे हमें हिन्दू, बौद्ध और
जैन देवी देवताओं की मूर्तियाँ देखने को मिलती हैं। इन मूर्तियों को
विभिन्न शैलियों से निर्मित किया गया है जैसे मथुरा कला शैली, सारनाथ कला
शैली, गुप्त कला शैली,. प्रतिहार कला शैली तथा परमार कला शैली आदि। हिन्दू
देवताओं के मूर्ती परंपरा की बात करें तो विष्णु भगवान् का मूर्तिशास्त्र
में अनेकों विभिन्न प्रकार के विवरण हमें देखने को मिलते हैं। विष्णु की
मूर्तियाँ अनेकों प्रकार से विकसित हुयी हैं तथा ये मूर्तियाँ विष्णु के
विभिन्न अवतारों पर आधारित हैं जिन्हें की दशावतार के नाम से जाना जाता है।
गुप्त काल को हिन्दू कला का स्वर्ण युग माना जाता है, यह वही काल है जब
भारतीय हिन्दू मंदिर परंपरा की शुरुआत होती है जिसके उदाहरण हमें साँची के
मंदिर संख्या 17 से देखने पर मिल जाते हैं, इसके अलावां नाचना कुठार,
ललितपुर के देवघर आदि से भी इस काल के कला का विकास देखने को मिलता है।
हिन्दू
मूर्तियों का विकास मौर्य साम्राज्य से होना शुरू हो चुका था जिसका अनुपम
उदाहरण मौर्य कालीन बलराम की प्रतिमा है। कुशाण काल के दौरान भी हिन्दू
प्रतिमाशास्त्र का विकास बड़े पैमाने पर हुआ जिसका उदहारण हमें विभिन्न
मूर्तियों से देखने को मिल जाता है, मथुरा कला के दौरान शिवलिंग तथा अन्य
मूर्तियों का विकास बड़े पैमाने पर हुआ।
यह
गुप्त काल ही था जब हिन्दू मूर्ती कला का विकास अपने चरम पर पहुंचा, भूमरा
का एक मुखी शिवलिंग, अहिक्षेत्र से प्राप्त गंगा और यमुना की प्रतिमाएं
आदि इस काल के कला का एक अनुपम और महत्वपूर्ण उदाहरण पेश करने का कार्य
करती है। दशावतार के मंदिर में बनी अनेकों प्रतिमाएं इस काल की कला के विषय
में अभूतपूर्व उदाहरण पेश करते हैं।
चौथी शताब्दी ईस्वी के पहले तक वासुदेव-कृष्ण की पूजा विष्णु की तुलना में
कहीं अधिक हुआ करती थी और यही कारण है की इसके पहले की विष्णु की मूर्तियाँ
प्रकाश में बहुत ही सीमित संख्या में आई हैं। गुप्त काल के दौरान ही
विष्णु के मूर्तिशास्त्र का विकास होना शुरू होता है। इसी दौरान विष्णु की
चतुरानन प्रतिमा का भी विकास हुआ। चतुरानन अर्थात चार भुजाओं वाला। विष्णु
को चार मुखों वाला भी मूर्ती शास्त्र में दिखाए जाने की परंपरा की भी
शुरुआत होती है, बैकुंठ विष्णु, वराह अवतार, मत्स्य अवतार आदि प्रतिमाओं का
विकास होता है। विष्णु के प्रतिमाओं में नरसिंह की प्रतिमा तथा कच्छप या
कछुए के रूप में दिखाया गया है, विष्णु के निवास स्थान को छीर सागर के रूप
में भी जाना जाता है और विष्णु छीर सागर में शेषनाग के ऊपर विराजित होते
है, मूर्ती शास्त्र में इससे जो प्रतिमा सम्बंधित है वह है शेषासई विष्णु
की प्रतिमा। विष्णु को पैर के निशान के रूप में भी प्रस्तुत किया जाता है
तथा इस निशान को विष्णुपाद के रूप में जाना जाता है। विष्णु को मुख्य रूप
से शंख, चक्र, गदा और पद्म धारण किये हुए दिखाया जाता है। चतुर्मुखी विष्णु
को बैकुंठ विष्णु के नाम से भी जाना जाता है जिसमे विष्णु के चार मुख का
अंकन किया जाता है तथा इनके आस पास नायिकाओं, नायकों तथा गन्धर्वों आदि का
भी अंकन किया जाता है तथा इस प्रकार की मूर्ती में विष्णु को खड़े हुए
दिखाया जाता है तथा इनमे 4 से 8 भुजाओं का अंकन किया जाता है। विष्णु के
वाहन गरुण का अंकन भी विष्णु की प्रतिमाओं पर किया जाता है।
नरसिंह की प्रतिमा में विष्णु को पुरुष आकृति का ही दिखाया जाता है परन्तु
इसमें उनके मुख को सिंह के मुख की तरह प्रदर्शित किया जाता है। विष्णु की
इस तरह की प्रतिमाओं में मुख्य रूप से हिरण्याक्ष वध का अंकन किया जाता है।
नरसिंह की मूर्तियों में विष्णु को 4 भुजाओं के साथ प्रदर्शित किया जाता
है तथा इन मूर्तियों में आयुध के रूप में चक्र, गदा, नाखून आदि का अंकन
किया जाता है।
वाराह प्रतिमा में विष्णु का अंकन जंगली सूकर के रूप में किया जाता है
जिसमे विष्णु को भू देवी को अपने सींगो पर उठाते हुए दिखाया जाता है।
विष्णु की एक मात्र प्रतिमा जो विष्णु के सभी अवतारों को एक साथ प्रदर्शित
करती है को विश्वरूप की प्रतिमा के रूप में जाना जाता है।
https://en.wikipedia.org/wiki/Vishvarupa
https://vedicfeed.com/symbols-of-lord-vishnu/
https://en.wikipedia.org/wiki/Hindu_art#Development_of_the_iconography_of_Vishnu
https://en.wikipedia.org/wiki/Vaikuntha_Chaturmurti
https://en.wikipedia.org/wiki/Narasimha
https://en.wikipedia.org/wiki/Varaha
चित्र सन्दर्भ:
मुख्य चित्र में दशावतार मंदिर (देवगढ़, ललितपुर) में स्थापित अनंतसई विष्णु की प्रतिमा को दिखाया गया है। (Flickr)
दूसरे चित्र में क्रमशः सारनाथ, मथुरा और गुप्त शैली में बनायीं गयी भगवान विष्णु की प्रतिमाओं को दिखाया गया है। (Prarang)
तीसरे चित्र में गुप्त काल में बनायीं गयी विष्णु प्रतिमाओं को दृश्यांवित किया गया है। (Prarang)
चौथे चित्र में मौर्यकालीन मुद्रा और मूर्तिकला में बलराम छवि दिखाई गयी है। (Prarang)
पांचवे चित्र में (दाएं और बाएँ) अहिछत्र गंगा, जमुना और भूमरा की एकमुखी शिवलिंग का चित्र है। (Prarang)
छठे चित्र में चतुरानन विष्णु की देव प्रतिमाओं को दिखाया गया है। (Prarang)
सातवें चित्र में भगवन विष्णु की चतुर्मुखी प्रतिमा को दिखाया गया है। (Prarang)
आठवें चित्र में बैकुंठ विष्णु को देवी लक्ष्मी के साथ गरुण पर सवार दिखाया गया है। (Publicdomainpictures)
नौवें चित्र में भगवान् विष्णु की नरसिंह अवतार की मूर्ति प्रदर्शित की गयी है। (Wikimedia)
दसवें चित्र में भगवान् विष्णु के विराट स्वरूप (विश्वरूप) और देवगढ़ (ललितपुर) में स्थापित शेषनाग पर सवार भगवान् विष्णु की प्रतिमाओं को दिखाया गया है। (Prarang)



























































































































































No comments:
Post a Comment