यक्षाला पालीत यक्ख व प्राकृतांत जक्ख म्हटले आहे. यक्षाच्या उत्पत्तिविषयी थोडा मतभेद आहे. रामायणांप्रमाणे जलाच्या संरक्षणासाठी प्रजापतीने विशिष्ट सृष्टी निर्माण केली व त्यांना आज्ञा दिली, 'रक्षध्वम्'. त्यापैकी काहीनी सांगितले 'रक्षामः' व काहींनी उत्तर दिले 'यक्षामः'. 'रक्षामः' म्हणणारे राक्षस, 'यक्षमः' म्हणणारे यक्ष झाले. अर्थात् यक्ष आणि राक्षस यांचा गोतावळा एकच होय.
जुन्या काळापासूनच यक्षाच्या दोन प्रकारच्या स्वरूपाची कल्पना केली गेली होती. एक रूप अत्यंत सुंदर अद्भुज सामर्थ्यवान व लोकांचे कल्याण करणारे असे मानले जात असे तर दुसरे रूपांत " बटबटीत डोळे, पसरलेले तोंड, आखुड मांड्या, सुटलेले पोट, अशा भयंकर देहाची कल्पना केली जात असे. प्रथम अर्थात अग्नी, इंद्र, कृष्ण बलराम, स्कंद, वगैरे देवांना यक्ष या नावाने संबोधित केले आहे." यक्षांप्रमाणेच यक्षिणी देखील फारच सामर्थ्य असणाऱ्या सुंदर व मायाजाल पसरण्यात तरबेज अशा स्त्रिया समजल्या जात. बरोबरच याच अर्थात 'यक्षिणीची कांडी' हा मराठीचा वाक्प्रचार आजही रूढ आहे. जुन्या वाङ्मयांत लक्ष्मी, एकानंशा, वगैरे देवी व ताटके सारख्या मायाविनींना यक्षिणी म्हटलेले आहे.
यक्षांच्या मंदिरांना किंवा 'स्थानांना' यक्षायतन किंवा यक्षस्थान म्हणत. चौरस्त्यावर त्यांचे पूजन करीत. यक्ष हे लोकदैवत असल्यामुळे वैदीक, बौद्ध व जैन तिन्ही धर्मात यांना मानले जाते. एवढेच की महाविलयनपद्धतीप्रमाणे तिन्हीं धर्मात यांना उपदेवतांचेच स्थान मिळत गेले. वैदीक धर्माप्रमाणे यक्षांचा तांडा कुबेराच्या अधिकारात होता. बौद्ध परंपरेप्रमाणे चार महाराज (राज शब्द हा यक्षाचाच पर्यायवाची होता) 'चातु महाराज' या नांवानी चार दिशांचे अधिपती मानले गेले आहेत." जैनांत तीर्थंकराचे शासन देव म्हणून कित्येक यक्ष विद्यमान आहेत. यक्षांचा प्रभाव गुप्तकाळांपासून कमी व्हायला लागतो.
देखणा द्वारपाल :-
द्वारपाल - वालूर :-
वेरुळ लेण्यातील द्वारपाल :-
तलाकाडू येथील द्वारपालाचे अनोखे शिल्प :-




हळेबीडू येथील अभिमन्यु शिल्प :-
ज्वरासुर (Jvarasura) :-
युद्ध शिल्पे :-
भक्ताची भव्य मूर्ती (औंढा नागनाथ, जि.हिंगोली) :-

व्याघ्रपाद शिल्प :-
एका शिवभक्ताचे हे शिल्प आणि त्यामागची कथा रोचक आहे.चिदंबरममध्ये रहाणारा व्याघ्रपाद हा भगवान शिवांचा कट्टर भक्त होता. भगवान शिवाची पुजा करण्यासाठी रोज पहाटे व्याघ्रपाद जंगलात काउन फुले आणायचा आणि शिवशंकरांना वहायचा. मात्र व्याघ्रपाद फुले गोळा करण्यापुर्वीच पक्षी आणि मधमाशा फुलातील मध शोषून घ्यायच्या. दुसर्या एका सजीवाने स्पर्श केलेली फुले शंकरांना वाहयला नको यासाठी व्याघ्रपाद पहाट व्हायच्या आधीच उठून खोल जंगलात जाऊन फुले वेचू कागला. मात्र फुलांसाठी आडबाजुच्या जंगलात जाण्यामुळे त्याच्या पायात काटे रुतु लागले. त्याचे पाय जखमांनी भरले. तसेच त्याची तब्येत ढास़ळू लागली. यामुळे करुणा येउन शिवशंकरांनी त्याला जंगलातील खडतर मार्गावर चालण्यासाठी मानवी पायाच्या जागी वाघाचे पंजे दिले, सहाजिकच त्याचे नाव व्याघ्रपाद पडले. आता व्याघ्रपादाला शिवासाठी फुले गोळा करण्यात कोणताच अडथळा उरला नाही. व्याघ्रपाद पुढे अनेक वर्ष चिदंबरममध्ये राहीला. तो पतंजलींचा स्मकालीन होता. पतंजली आणि व्याघ्रपाद या दोघांना भगवान शिवाने नटराज स्वरुपात दर्शन दिल्याने त्यांना जन्म-मृत्युच्या फेर्यातून बाहेर पडून मुक्ती मिळाली.नर्तकाची देखणी मूर्ती :-
पशु पक्षी शिल्पं घोटण :-
घोड्याच्या पायदळी शिक्षा :-
पैठण (ता. पैठण जि. छत्रपती संभाजीनगर ) येथील ज्ञानेश्वर उद्यानात (जे की आता पूर्णत: उद्ध्वस्त आहे) बाळासाहेब पाटील वस्तुसंग्रहालय आहे. या वस्तुसंग्रहालयाच्या अंगणात काही प्राचीन शिल्प अवशेष मांडून ठेवले आहेत. यात शेषशायी विष्णु, शिवपार्वती, सुरसुंदरी, कोरीव दगडी रांजण अशी शिल्पं आहेत. त्यातील हे एक शिल्प. प्रथमदर्शनी जलकुंभ घेतलेली सुरसुंदरी असावी असे वाटले. पण बारकाईने बघितल्यावर खालच्या आकृतीकडे लक्ष गेले. पाण्यासाठी ओंजळ पसरलेली एक व्यक्ती आढळून येते. ती पाहताच शिल्पाचा अर्थच बदलून जातो. तहानलेल्यांना पाणी देण्याचा शांत भाव स्त्रीच्या चेहर्यावर झळकायला लागतो. तहानेची कासावीस पसरलेल्या ओंजळीमागच्या चेहर्यावर दिसायला लागते. या शिल्पाला नाव काय द्यावे? सुरसुंदरी शोभत नाही. जलदेवता म्हणावं तर त्याला वेगळा अर्थ आहे. शिल्पशास्त्रात याला वेगळे नाव नाही. मुळात हे शिल्प केवळ शास्त्र म्हणून किंवा सौंदर्य म्हणून निर्माण झालेलं वाटतच नाही. तहानेने व्याकुळलेला माणुस आणि त्याची तहान भागवणारी स्त्री असं हे शिल्प आहे. म्हणून याला "तहान देवता" असं नाव देतो.
जागते रहो चित्रपटात राज कपुर रात्रभर पाण्यासाठी वणवण भटकतो. पहाटे पहाटे त्याला तुळशीची पुजा करून पाणी घालणारी सुस्नात नर्गीस दिसते. तिच्यासमोर तो ओंजळ पसरतो आणि ती वरतुन पाण्याची धार ओतते. "जागो मोहन प्यारे" हे लताच्या आवाजातील गाणं पार्श्वभुमीवर वाजत रहातं. सलील चौधरीच्या या अवीट गाण्याचे सुर हे शिल्प पाहताना मनात घुमत होते.
भरहूतच्या स्तुप स्तंभावरचे एक प्राचीन व्यंगचित्र :-
शिराळशेट :-
पाल शिल्प कलेतील मातृ भावना...
पाल कालखंडात दहाव्या शतकात निर्माण झालेली साधारणतः लांबी ३५" ( ८९ सेमी ) असलेली ही मूर्ती आहे. एका ऋषीची पत्नी सुचिस्मती हिला स्वतः शिवासारखा मुलगा हवा होता. तिची इच्छा लक्षात घेऊन तिच्या पतीने वाराणसी (बनारस) येथे एका लिंगाची पूजा केली आणि शिवाने स्वत:ला सुचिस्मतीचा मुलगा म्हणून जन्म घेतला, ज्याचे नाव गृहपती होते. ऋषी पत्नीच्या इच्छेसाठी, शिवाने हे नाव आणि रूप धारण केले, तर गृहापती हे नाव अग्निशी संबंधित असून शिव व अग्नी यांचा सहसंबंध ही पौराणिक कथेत सापडतो. ही आख्यायिका पाल राजवंशात शिल्पांमध्ये वारंवार दर्शविली जाते, ज्यामध्ये आई आणि मूल एका भव्य पलंगावर झोपलेले दर्शवितात. शिल्पपटाच्या मध्यभागी आई आणि मुल दाखविले जाते. प्रस्तुत शिल्पात सुचिस्मतीच्या पायाची मालिश करणारी एक महिला परिचारक कोरलेली असते; तर दुसरी हाती पंखा घेतलेली परिचारिका ही डोक्याजवळ असते. शिल्पाच्या वरील बाजूस लिंग आणि कमलस्थित गणेश असतो. त्या सोबतच नऊ ग्रह कोरलेले असतात. खालील बाजूस म्हणजे पलंगाच्या समोर, उपासकांच्या लघु आकृती आणि विविध धार्मिक वस्तू दाखवतात. आई सुंदर पोशाख घातलेली असून तिचे खांदे आणि डावा हात एका मोठ्या उशीवर टेकवलेले आहेत. तिने तिचा उजवा हात वर केलेला असून ती कमळ धारिनी आहे, ती तिच्या शेजारी झोपलेल्या बाळाच्या संदर्भाने विचार करते आहे, असे वाटते. प्रस्तुत शिल्प सुव्यवस्थित, भव्य रचनेसह निर्माण करण्यात कलाकार यशस्वी झालेला आहे. हे शिल्प केवळ पाल शिल्पकलेलाच नव्हे तर भारतीय शिल्पकलेला समृद्ध करते, जिथे पाल कलेतील आई आणि मुलाची कथा शिल्पित आहे, जी एका दैवी जन्माचा संदर्भ देते. असे असले तरी सुलभ मातृ भाव स्पष्ट होण्यास भारतीय शिल्प कला धर्म आणि धर्माच्या माध्यमाने मानवी भावना समृध्द करते असेच म्हणावे लागेल.मुर्तीशास्त्रात योगासने :-
आधुनिक जीवनशैलीमुळे आरोग्यसंबंधीच्या निर्माण झालेल्या अनेक समस्या तसेच दिवसेंदिवस वाढत चाललेला ताण-तणाव, यांवरती उपाय म्हणून योगसाधनेकडे जग मोठया आशेने पाहत आहे. दैनंदिन जीवनात आरोग्य विषयीचे महत्त्व आपल्या पूर्वजांनी फार पूर्वीपासूनच ओळखले होते. यासाठी त्यांनी योगसाधनेला आपलेसे केले. अनेक ऋषी-मुनींनी योगविद्येच्या बळावर आपले व इतरांचे जीवन आरोग्यदायी बनविण्याचा प्रयत्न केला. जागो-जागी असणारे सांप्रदायिक मठ तसेच गुहा-कंदरांमध्ये ही साधना चालत असे. वरचेवर यात नवनवीन प्रयोग झाल्याने ही विद्या भरभराटीस आली. कित्येक प्राचीन मंदिरांवरती शिल्पकलेच्या रुपात आपल्याला याचे पुरावे मिळतात.आपला हा प्राचीन वारसा अनेक ग्रंथ व मौखिक परंपरेने तर जपला गेला आहेच, परंतु हा एवढया पुरताच मर्यादित न राहता शिल्पकलेच्या माध्यमातूनही जोपासण्याचा प्रयत्न झाला. योगविषयीची अनेक आसने, मुद्रा, प्राणायामांचे प्रकार शिल्पबद्ध केले गेले. पुणे परिसरात व जिल्ह्यात इतरत्र अशा प्रकारची शिल्पे व अवशेष आपल्याला पहावयास मिळतात.
आज पुणे शहरातील योगविद्येच्या प्रचार व प्रसारासाठी बराचसा होत असला तरी, ही परंपरा पुण्यासाठी नवीन नाही. इसवीसन १७५४ ते १७७० या काळात सोमवार पेठेत बांधल्या गेलेल्या त्रिशुंड गणपती मंदिर व मठात योगविद्येची साधना केली जात असे. साधकांना योग्य प्रकारे साधना करता यावी म्हणून विशिष्ट खोल्यांची रचनाही येथे केली गेली होती. येथे ‘धुम्रपान’ नावाची एक विशिष्ट साधना होत असे. त्यामध्ये हठयोगाचे साधक स्वतःला छताला उलटे टांगून घेत व खाली निखाऱ्यामध्ये काही औषधी वनस्पती टाकल्या जात व त्यापासून निघालेला धूर ते नाकाद्वारे घेत असत. यामध्ये संभवतः दशनामी गोसावी पंथातील साधक हठयोगाची साधना करीत. येथे काही योगसाधकांच्या समाध्याही आहेत. अशा या योग-स्मारकाचे संवर्धन करून त्याचा विकास करणे अगत्याचे आहे.
पुण्यापासून साधारणतः ५४ किमी अंतरावर पिंपरी-दुमाला नावाचे गाव आहे. येथील सोमेश्वर मंदिरावर कुंडलिनी योग विषयीचे महत्त्व सांगणारे दुर्मिळ शिल्प आहे. सुमारे सातशे वर्षांपूर्वी हे मंदिर बांधले गेले. या मंदिराच्या प्रदक्षिणामार्गावर संभवतः आदिनाथांची एक अतिशय दुर्मिळ प्रतिमा आहे. आदिनाथ अर्थात शिव. यामध्ये ते समाधिस्थ योगीच्या रुपात साकारले गेले असून ते पद्मासनात बसले आहेत. त्यांचा उजवा हात ‘सूची’ मुद्रेत आहे. सर्वात वैशिष्ट्यपूर्ण गोष्ट म्हणजे शिल्पकाराने त्यांच्या डोक्यावर अर्धवट उमललेले कमळ दाखविले आहे. हे कमळ योग साधनेत खूप महत्त्वाचे प्रतिक मानले जाते. मानवी शरीरात कुंडलिनीरूपाने ‘शक्ती’ सुप्त अवस्थेत असते तसेच मस्तकातील सहस्रारांत शिवाचा निवास असतो. कुंडलिनीचा प्रवास मेरुदंडाजवळील मूलाधार चक्रापासून सुरु होऊन त्यानंतर स्वाधिष्ठान चक्र, मणिपूर चक्र, अनाहत चक्र, विशुद्धाख्य चक्र आणि आज्ञा चक्र अशा सहा चक्रांना ओलांडून सहस्रारांत संपतो. योगी ह्या कुंडलिनीरुपी शक्तीला जागृत करून सुषुम्ना नाडीच्या माध्यमातून शक्ती व शिवाचे मिलन सहस्रारांत घडवून आणतो आणि हे सहस्रार रुपी कमळ उमलले जाते अर्थात योग्यास परमानंदमय समाधी प्राप्त होते. असे हे अनन्यसाधारण शिल्प येथील मंदिरावर कोरण्यात आले आहे. पुणे परिसरात योगसाधनेचा प्रचार-प्रसार किती मोठ्या प्रमाणात झाला होता याचे हे उत्तम उदाहरणच होय. सोमेश्वर मंदिरांवरील या शिल्पांमध्ये नाथ संप्रदायातील इतर हठयोगीही दाखविले आहेत. यामध्ये मत्स्येंद्रनाथ व गोरक्षनाथांची शिल्पे या भागात दुर्मिळच म्हणावी लागतील. योगसाधनेच्या उज्ज्वल परंपरेमध्ये पिंपरी-दुमाला येथील मंदिरावरील हठयोगाच्या महान गुरूंची शिल्पे राष्ट्रीय संपदा ठरावीत अशी आहेत.
कुंडलिनी योगाचे ज्ञानेश्वरांनी आपल्या ग्रंथात भरपूर विवेचन केले आहे. आळंदी येथे इंद्रायणी काठी तर ८४ सिद्धांचा मेळा भरत असे. या सिद्धांपैकी काही सिद्ध हे हठयोगी होते. ज्ञानेश्वरांच्या परंपरेतील नाथ-योग्यांच्या समाध्या आजही ज्ञानेश्वर मंदिर परिसरात पहावयास मिळतात.
पुण्यापासून साधारणतः ५४ किमी अंतरावर प्रसिद्ध असणाऱ्या प्राचिन भुलेश्वर मंदिरातही सिद्धांची बरीच शिल्पे आहेत. त्यांना पद्मासन, सिद्धासन यांसारखी विभिन्न आसने व मुद्रांमध्ये दर्शविले आहे. किंबहुना येथील एक सुंदर शिल्प विशिष्ट अशा द्विपादशिरासनात असून साधकाने यात आपल्या पाठीमागे दोन्ही पाय एकमेकांत अडकविले आहेत.
जुन्नरपासून साधारणतः १० किमी अंतरावरील पारुंडे गावातील ब्रह्मनाथ मंदिराच्या खांबांवरती विविध ध्यान-धारणा व आसनातील अनेक शिल्पे कोरण्यात आली आहेत. उर्ध्व-धनुरासन, गरुडासन, नौकासन, प्रसारित-पादोत्तानासन, गोमुखासन, पाद-पश्चिमोत्तानासन, अनंतासन, अर्ध-मत्स्येन्द्रासन, क्रौंचासन अशा किती तरी आसनांचे प्रकार येथे कोरले गेले आहेत.
येथूनच पुढे हरिश्चंद्रगडावर प्रसिद्ध योगी चांगदेव यांनी ‘तत्त्वसार’ नावाचा ग्रंथ लिहिला होता. त्यामुळे हा परिसर एकेकाळी योग साधकांच्या गर्दीने फुलून गेलेला असावा असे दिसते. अशा या दर्जेदार वारशामुळे सांस्कृतिक, शैक्षणिक क्षेत्रांबरोबरच योगसाधनेच्या परंपरेतही पुणे परिसर व जिल्ह्याचे महत्त्व ठळकपणे दिसून येते.
योग विद्येचे जागतिक महत्त्व ओळखून या स्थळांचे व्यवस्थितरित्या संगोपन व संवर्धन होणे गरजेचे आहे. योगसाधनेच्या परंपरेत आपणासही असा प्राचीन वारसा लाभला आहे, याचा अभिमान सर्वांनी बाळगायला हवा. या अवशेषांचे अस्तित्त्व टिकून राहणे म्हणजे आपले व आपल्या पूर्वजांचे अस्तित्त्व टिकून राहण्यासारखे आहे. हा अनमोल ठेवा नाहिसा होण्याअगोदर त्याची माहिती सर्वदूर पोहोचवून त्याचे महत्त्व जगासमोर मांडणे गरजेचे आहे. संपूर्ण विश्व योगसाधनेला जवळ करीत असताना आपणही या निमित्ताने आपल्या पूर्वजांप्रमाणे योगविद्येला अंगीकारून आपल्या जीवनाचा अविभाज्य घटक बनवायला हवे. आपल्या भारतीय योगपरंपरेचे हे प्राचीन दुर्मिळ पुरावे निश्चितच संपूर्ण जगासाठी मार्गदर्शक व प्रेरक ठरतील व आपल्या पूर्वजांचे महान कार्य शिल्परूपाने बोलू लागतील.
नाग आणि मुंगुसाची लढाई :-
शिकार शिल्पः:-
मंदीरावर असलेली उंटाची शिल्प :-
उंट हे हनुमानाचे एक वाहन आहे. वास्तविक उंट निसर्गतः भारतात फक्त राजस्थानमध्येच आढळतात. तरीही काही मंदीरावर उंटाची शिल्प बघायला मिळतात.

कुट शिल्प :-
कोडे घालणे आणि बुध्दीचातुर्य पणाला लावून ते सोडवणे बहुतेक सर्वांना आवडते. कदाचित हिच मानवी मनाची आवड लक्षात घेउन भाविक मंदीरात रमावेत यासाठी मंदीराच्या बाह्य भिंतीवर किंवा सभामंडपातील स्तंभावर काही कुट शिल्प बघायला मिळतात. यात चित्रविचीत्र किंवा अमानवी रचना बघायला मिळते.कुट शिल्प काहीवेळा दोन किंवा अधिक प्राण्यांचे एकत्रित शिल्प असते किंवा फक्त मानवाकृती एकत्र करुन तयार केलेले असते.
पाण्यांच्या कुट शिल्पात बहुतेकदा त्यांचे शिर सामायिक दाखवून आभास साधलेला असतो. मानवी कुट शिल्पात मात्र दोन प्रकार दिसतात.
१) शिर सामायिक असून अनेक धड दाखवली असतात.
२) धड सामायिक असून मस्तक अनेक दाखवली असतात.
इथे एकच शिर सामायिक असून एक शरीर बैलाचे तर एक शरीर हत्तीचे दाखवले असते. मात्र शिर अश्याकाही खुबीने कोरले असते कि हत्तीच्या बाजुने बघीतल्यास ते सोंड असलेल्या हत्तीसारखे दिसेल तर बैलाच्या बाजुने बघीतल्यास शिंगे असलेल्या बैलासारखे दिसेल. इथे गज म्हणजे वैष्णव पंथाचे प्रतिक आहे तर बैल हा शैवपंथाचे प्रतिक आहे.इथे महत्वाची गोष्ट म्हणजे हत्ती आणि बैलाचा आकार सारखाच आहे. म्हणजे दोन्ही पंथाना समान महत्व दिले आहे.
सोलापुर जिल्ह्यातील कुडल संगम मंदीरातील एक कुट शिल्प लक्षणीय आहे. हे शिल्प अद्भुत असून ह्यात श्रीकृष्णाचा एक चेहरा व त्यास पाच शरीर परंतु ह्या शिल्पाची निर्मिती अश्या पद्धतीने केली आहे कि कोणत्याही अवस्थेतील शरीराला शिर हे तंतोतंत जोडलेले दिसते.

हे शिल्प चारठाणा (ता. जिंतूर जि. परभणी) येथील गोकूळेश्वर मंदिराच्या मुखमंडपाच्या स्तंभावरील आहे. यात एकुण पाच मानवी आकृती दिसून येतात. पण पाय मात्र ८ आहेत. दोन्ही टोकाच्या दोन स्त्रीया आहेत. अगदी मधला पुरूष आहे. पण त्या बाजूचे दोन कोण हे चटकन कळत नाहीत. कारण त्यांचे केस स्त्रीयांसारखे मागे बांधलेले आहेत. पण छाती सपाट दाखवली असल्याने त्यांना स्त्री संबोधता येत नाही.
मधल्यांनी बाजूच्यांच्या डोक्यावर हात ठेवले आहेत. शिवाय सर्वात मधल्याचे वाटणारे दोन्ही हात बाजूच्या स्त्रीयांच्या हातात आहेत. हेच हात मधल्या पुरूषांचेही भासतात. पायासोबतच हाताचीही संख्या आठच आहे.
यातील टोकाच्या स्त्रीया स्वतंत्र आहेत. मधले तीनही एकमेकात अडकलेले आहेत. एक तर्क असा मांडता येतो. पुरूषाच्या उजव्या बाजूस त्याची शक्ती असते आणि डाव्या बाजूस पत्नी (वामांगी). बहूतेक देवतांच्या बाबत हे शिल्पांकित केलेले आढळून येते. येथे सामान्य पुरूषाच्या बाबतीतही हे सुचित केले असावे. आणि आज कार्टून काढताना जशी चलचित्र (animation) काढली जातात तसे उजवीकडचे चित्र पहिले, दूसरे चित्र दोन्ही स्त्रीयांचे हात हाती घेतलेले. आणि तिसरे मग पूर्णत: डावीकडच्या स्त्रीच्या डोक्यावर हात ठेवला असे. मधला पुरूष एकच असावा. फक्त तीन अवस्थांत दाखवला आहे. याला एक गती आहे. ही नृत्यातीलही एक गतीमान अशी मुद्रा असू शकते. कारण डाव्या बाजूच्या स्त्रीच्या हातात टिपरी सारखे काही दिसत आहे.
याचा तंत्रमार्गातही काही वेगळा अर्थ असू शकेल. केसांची आणि पायांची रचना यातून पुरूषांत स्त्रीचा अंश आहे असेही सुचवायचे असावे.
मखर, अर्थात मकरतोरण :-

ही दिवेआगरमधली विष्णूच्या कानातील मकरकुंडले (१२ वे शतक)



तोरण शिल्पाचा 3D नमुना :-
द्वारशाखेवरील 3D शिल्प :-
स्तंभ घटक :-
व्याल किंवा मिथक शिल्पे :-
प्राचीन भारतीय मंदिरे, लेणी हे आपले स्थापत्य वैभव. आपल्या पूर्वसुरींनी निर्माण केलेले हे स्थापत्य आज आपल्याला त्यांच्या कर्तृत्वाची, सामर्थ्याची आणि वैभवाची गाथा सांगतात. मंदिरे, मूर्ती, मंदिरांची रचना, त्यांचे स्थापत्य अशा अनेक विषयांवर विविध अभ्यासकांनी विपुल लेखन केले आहे. मंदिर स्थापत्य आणि मूर्तिशास्त्र हा विषयच मुळी असा आहे की, त्यावर विविधांगांनी अभ्यास करता येतो. त्यावर लेखन करता येते आणि मग त्यातले निरनिराळे पैलू उलगडून दाखवता येतात. मंदिर हे केवळ त्या देवाचे निवासस्थान न राहता ती एक सामाजिक संस्था होऊन जाते. समाजात घडणाऱया विविध गोष्टींचे प्रतिबिंब मंदिरांवर निरनिराळ्या शिल्पांच्या रूपाने आपल्याला बघायला मिळते. मग कधी ही शिल्पे युद्धाची असतात, कधी माणसाच्या दैनंदिन जीवनात घडणाऱया प्रसंगांची असतात, कधी देवदेवतांची असतात, तर कधी कामशिल्पेसुद्धा मंदिरावर कोरलेली आढळतात. या प्रत्येक शिल्पाच्या तिथे असण्याला काहीतरी अर्थ असतो, त्याचे काहीना काही प्रयोजन असते. उगाचच जागा आहे म्हणून कुठलेसे शिल्प मंदिरावर कोरले आहे असे अजिबात होत नाही. मग त्या शिल्पामागे कुठलीशी पौराणिक कथा असेल, त्या-त्या विशिष्ट देवतेचे महत्त्व समजावून सांगण्यासाठी त्या देवतेचे सामर्थ्य दाखवणारी ती शिल्पे असतील किंवा कुठल्या तत्त्वज्ञानाची ओळख त्या विशिष्ट शिल्पाच्या माध्यमातून करून दिलेली असेल. प्रत्येक शिल्प हे काहीतरी प्रयोजन घेऊनच मंदिरावर विराजमान झालेले असते. त्यामुळे या शिल्पांमध्ये खूप मोठय़ा प्रमाणावर विविधता दिसून येते. त्यांचे विषय वेगळे, त्यांची शैली वेगळी, त्यांची तऱ्हाच निराळी.आपण मंदिरांवर, लेणींमध्ये आणि विविध स्थापत्यांवर कोरलेले पौराणिक प्राणी किंवा काल्पनिक संमिश्र प्राणी यांची माहिती घेणार आहोत. इंग्रजीत या प्राण्यांना ‘मिथिकल अॅनिमल’ असे संबोधले जाते. याचा शब्दश अर्थ ‘पौराणिक प्राणी’ असा होतो. मात्र याचा पौराणिक प्राण्यांबरोबरच काल्पनिक प्राणी असाही उल्लेख असायला हवा. कारण महाकाव्ये, पुराणे यातून उल्लेख आलेले हे प्राणी मुळात काल्पनिक आहेत. माणसाच्या कल्पनाविलासातून त्यांची निर्मिती झाली आहे. साहित्यात त्यांची निर्मिती होताना मुख्यत्वे दोन विविध प्राण्यांचे एकत्रीकरण करून एखाद्या प्राण्याचे चित्रण केले गेले आहे. एका प्राण्याचे डोके आणि दुसऱया प्राण्याचे धड यांच्या एकत्रीकरणातून असे प्राणी कल्पिले गेले.
प्राचीन भारतीय कलेचा अभ्यास करताना, विशेषत शिल्पकला आणि चित्रकला या कला विविध विषयांनी, देवदेवतांच्या कथांनी आणि त्यावर आधारित शिल्पांनी, पानाफुलांच्या सजावटींनी बहरलेल्या दिसतात. याशिवाय विविध पशुपक्षी यांचाही इथे समावेश होतो. निरनिराळ्या पशुपक्ष्यांचे एकत्रीकरण करून तयार झालेले विलक्षण, मोहक असे काल्पनिक प्राणिविश्व आणि त्यांच्यामुळे बहरलेली भारतीय कला हा मनोरंजक विषय आहे.
प्राणी वा पक्ष्यांचे एकत्रीकरण किंवा त्यांचे संमिश्र रूप म्हणजे एका प्राण्याचे तोंड आणि दुसऱया प्राण्याचे शरीर अशी संयुक्त रचना करून तयार केलेली शिल्पे आपल्याला प्राचीन काळापासून हिंदुस्थानी कलेत दिसून येतात. या व्यालप्रतिमा म्हणजेच मिथकशिल्पांचे देखणेपण उठून दिसते.
शंकराच्या मंदिरात गेल्यावर गाभाऱयाच्या उंबरठय़ावर एक राक्षसाचे तोंड कोरलेले दिसते. कार्ल्याच्या लेणीत गेल्यावर तिथल्या खांबांवर कुणी चमत्कारिक प्राणी दिसतात. राशीचक्र बघताना धनु राशीचे चिन्ह दाखवताना अर्धा घोडा आणि अर्धा माणूस दाखवतात. काही काही देवळांवर चांगले तीन फूट उंचीचे प्राणी दिसतात. त्यांचे तोंड हत्तीचे असते आणि उरलेला देह सिंहाचा असतो. हंपीला गेल्यावर तिथल्या विठ्ठल मंदिराच्या खांबावर एक निराळाच प्राणी दिसतो. वेगवेगळ्या प्राण्यांचे अवयव एकत्र करून घडवलेला हा प्राणी असतो. त्याचं नाव काही सांगता येत नाही. त्याचं नक्की रूप काय आहे हेदेखील समजत नाही. काय असतं हे सगळं? कशासाठी अशी रचना केलेली असते? या प्राण्यांची काही कथा आहे का? असे असंख्य प्रश्न आपल्याला पडतात आणि त्याची समाधानकारक उत्तरे काही मिळत नाहीत.

या सगळ्या प्राण्यांना मिथक प्राणी, पौराणिक प्राणी किंवा काल्पनिक प्राणी असे म्हणतात. या सगळ्याचा एक सोपा शब्द नंतर समोर येतो तो म्हणजे ‘व्यालशिल्पे’. यांना व्याल असे संबोधले जाते. प्राणी वा पक्ष्यांचे एकत्रीकरण किंवा त्यांचे संमिश्र रूप म्हणजे एका प्राण्याचे तोंड आणि दुसऱया प्राण्याचे शरीर अशी संयुक्त रचना करून तयार केलेली शिल्पे आपल्याला प्राचीन काळापासून हिंदुस्थानी कलेत दिसून येतात. या प्रकाराला ‘व्याल’ असा शब्द जरी सध्या रूढ झालेला असला तरी हा शब्द साधारण इ.स.च्या 6 व्या शतकानंतर वापरला जाऊ लागला.यालाच वारालक, वराल, वीराल,व्रलीका, वरालीक, अशी नावे आहेत. दक्षिण भारतात ‘याली‘ तर ओरिसात याला “बीडाल” म्हणतात. संयुक्त प्राणी ज्याला इंग्रजीत ‘मिथीकल अॅनिमल‘ असं म्हटलं गेलं आहे, त्याला आपण पौराणिक किंवा खरं तर काल्पनिक प्राणी म्हणू शकतो. हे असे प्राणी कलेत दाखवणे ही कलाकाराच्या कल्पनाशक्तीची भरारी म्हणावी लागेल. कलाकारांच्या या कल्पनाशक्तीला जोड मिळाली आहे ती या प्राण्यांच्या साहित्यातून येणाऱया वर्णनांची आणि त्याचबरोबर परकीय कलेच्या प्रभावाची. हिंदुस्थानी कलेमध्ये अशा संयुक्त प्राण्यांच्या वापराचे संदर्भ आपल्याला प्राचीन साहित्यांतूनही मिळतात. साहित्यात अशा प्राण्यांना ‘इहामृग’ असे म्हटले गेले आहे.

संमिश्र प्राणी किंवा संमिश्र पक्षी यांचे कलेतील सादरीकरण आपण सांची, भारहूत, अमरावती, नागार्जुनकोंडा इथे तसेच अजिंठा इथल्या लेणींमधील चित्रकलेत बघितले. ‘इहामृग’ अर्थात संमिश्र प्राण्यांची संकल्पना पुढे ‘व्याल’ या संकल्पनेत परावर्तित झालेली दिसून येते आणि इ.स.च्या 6 व्या शतकानंतर बांधलेल्या अनेक मंदिरांवर हे व्याल किंवा असे संमिश्र प्राणी मोठय़ा प्रमाणावर कोरलेले दिसून येतात. हे व्याल कोरताना भिन्न प्राण्यांची शरीरे एकत्र करून हे काल्पनिक प्राणी कोरले गेले आहेत. एका प्राण्याचे तोंड आणि दुसऱया एका किंवा एकापेक्षा जास्त प्राण्यांच्या शरीराचे भाग एकत्र करून असे व्याल कोरले गेले. ज्या प्राण्याचे तोंड कोरलेले असेल त्याच्या नावाने तो व्याल ओळखला जातो. उदाहरणार्थ, हत्तीचे तोंड आणि शरीर सिंहाचे असे शिल्प असेल तर त्याला ‘गजव्याल’ असे म्हटले जाते. मग मकरव्याल, अश्वव्याल, अजव्याल, गणेशव्याल अशा असंख्य व्याल प्रतिमा मंदिरांवर कोरलेल्या दिसून येतात. खजुराहो इथल्या मंदिरांवर असे व्याल दिसून येतात. महाराष्ट्राचा विचार करायचा झाला तर गडचिरोली जिह्यातल्या मार्कंडा मंदिरावर खूप मोठय़ा संख्येने व्याल कोरलेले आहेत. तारकाकृती आकारामुळे मंदिराच्या बाह्य भिंतीना अनेक कोन निर्माण होतात. उठाव असलेल्या भिंतींवर विविध देवदेवतांच्या मूर्ती कोरलेल्या दिसून येतात, तर त्या दोन मूर्तींच्या आतमध्ये असलेल्या कोनांवर व्याल प्रतिमा कोरलेल्या असतात. या व्याल प्रतिमांचे देखणेपण आणि त्यांचा ठसठशीतपणा प्रकर्षाने उठून दिसतो.

छत्तीसगड येथील मंदीरावरील व्याल
मिथक शिल्पे – इहामृग
मिथक शिल्पे म्हणजे प्राणी वा पक्ष्यांचे एकत्रीकरण किंवा त्यांचे संमिश्र रूप. थोडक्यात काय तर एका प्राण्याचे तोंड आणि दुसऱया प्राण्याचे शरीर अशी संयुक्त रचना करून तयार केलेली शिल्पे. अशी शिल्पे आपल्याला फार प्राचीन काळापासून भारतीय कलेमधे दिसून येतात. या प्रकाराला सरसकट ‘व्याल’ असे सध्या जरी म्हणत असले तरी ‘व्याल’ हा शब्द इ.स.च्या साधारण 6 व्या शतकानंतर वापरला जाऊ लागला. संयुक्त प्राणी ज्याला इंग्रजीत ‘मिथीकल अॅनिमल’ असं म्हटलं गेलं आहे. हे अशा प्रकारचे काल्पनिक प्राणी कलेत दाखवणे ही कलाकाराच्या कल्पनाशक्तीची उत्तुंग भरारी म्हणावी लागेल. कलाकारांच्या या कल्पनाशक्तीला जोड मिळाली ती या प्राण्यांच्या साहित्यातून येणाऱया वर्णनांची आणि त्याचबरोबर परकीय कलेच्या प्रभावाची. भारतीय कलेमध्ये अशा संयुक्त प्राण्यांच्या वापराचे संदर्भ आपल्याला अगदी प्राचीन साहित्यातून मिळतात. साहित्यात अशा प्राण्यांना ‘इहामृग’ असे म्हटले गेले आहे.

‘इहामृग’ याचा शब्दश अर्थ ‘इच्छाधारी हरीण’ असा होतो किंवा त्याचा अर्थ एक काळवीट असा आहे. मात्र ‘इहामृग’ हा शब्द काही विशिष्ट हेतूनेच वापरला जातो. काही प्राचीन साहित्यात काही ठिकाणी असेही उल्लेख सापडतात की, माणसाचा तोंडावळा हा कुठल्या तरी प्राण्याच्या किंवा पक्ष्याच्या रूपाशी साम्य दाखवतो. मग यातूनच पुढे माणसाचे शरीर आणि कुठल्याशा प्राण्याचे किंवा पक्ष्याचे तोंड असलेला प्राणी दाखवणे किंवा दोन भिन्न प्राण्यांचे एकत्रीकरण करून एखादी काल्पनिक कलाकृती करणे हे कसब कलाकारांनी साधले. यालाच पुढे ‘इहामृग’ असे म्हणू लागले. थोडक्यात काय तर ‘इहामृग’ म्हणजे कलाकाराच्या डोक्यातून आलेली कुठल्याशा संमिश्र प्राण्याची एक विलक्षण काल्पनिक प्रतिमा होय.
साहित्यातले संदर्भ
प्राचीन भारतीय साहित्यात इहामृगाचे खूप संदर्भ सापडतात. या संदर्भांचे धागेदोरे अगदी ऋग्वेदापर्यंत गेलेले आहेत. ऋग्वेदात ‘इहामृग’ असा शब्द येत नाही, तर ‘यातु’ असा शब्द आहे. उलुकयातु म्हणजे घुबड, स्वयातु म्हणजे कुत्रा, कोकायातु म्हणजे कोकिळा, सुपर्णयातु म्हणजे गरुड तर गृध्रयातु म्हणजे गिधाड. ऋग्वेदात या सगळ्यांचा इंद्राशी संबंध जोडलेला दिसतो. ऋग्वेदात इंद्राला ‘नृयातु’ असा शब्द आहे.

माणसाचे शरीर आणि प्राण्याचे शरीर हे अर्थातच भिन्न-भिन्न साच्यांतून तयार झालेले आहे. या दोन भिन्न साच्यांच्या एकत्रीकरणातून म्हणा किंवा दोन भिन्न गोष्टींच्या संयोगातून काही काल्पनिक प्रकार उदयाला आले. कलेमध्ये असे एकत्रीकरण दाखवण्याची कल्पना हळूहळू विकसित होत गेली आणि त्यातूनच गणपती, हयग्रीव, हनुमान, वृक्षकपी, नृसिंह, नृवराह असे निरनिराळे आकार, आकृतिबंध किंवा प्रारूपे विकसित होत गेली. ऋग्वेदात अशा काही चमत्कारिक प्रारूपांचे किंवा आकृतिबंधांचे संदर्भ आलेले आहेत. जसे की चार शिंगे, दोन डोकी, तीन पाय, सात हात असलेला बैल दिसतो. तिथे त्याला ‘अग्नी’ असे संबोधले गेले आहे. तसंच ऋग्वेदात कुणा चार शिंगांच्या रेडय़ाचेसुद्धा वर्णन येते. अथर्ववेदात दहा डोकी असलेल्या ब्राह्मणाचा उल्लेख येतो. ‘दशशीर्ष दस्य’ असे त्याला म्हटलेले आहे, तर ‘शतपथ ब्राह्मणा’त दहा डोक्यांचे वासरू आणि दोन तोंडांचा गरुड यांचा उल्लेख आलेला आहे. हे सगळे प्रकार ‘इहामृग’ या संकल्पनेत गणले गेलेले आहेत. थोडक्यात काय तर प्राचीन काळी कुठल्याही अद्भुत किंवा चमत्कारिक प्राण्याला ‘इहामृग’ म्हणत असत असं दिसतं.

‘वाल्मीकी रामायणा’त इहामृगाचं चित्रमय वर्णन येते. त्यातील उल्लेखानुसार या इहामृगांचे शिल्पांकन अत्यंत सुबकतेने राजवाडय़ाच्या खांबांवर कोरलेले आहे. मात्र हे आकृतिबंध त्या खांबांवर नक्की कुठे आणि कशा प्रकारे कोरले होते याबद्दल रामायण काही बोलत नाही. त्यामुळे हे इहामृगांचे कोरीवकाम नेमके कुठे केले असेल याबद्दल निव्वळ अंदाजच बांधावा लागतो. वरील उल्लेख रामायणाच्या ‘सुंदरकांडा’त काही ठिकाणी आलेले आहेत. महाभारतातसुद्धा इहामृगासंबंधी काही संकल्पना येतात. ‘मीनवजी’ किंवा ‘गजवक्रतजश’ अशा नावाने येणारे ते उल्लेख होत (इशानाम गजवत्रानाम मुलुकानाम ततैवच मीनवाजी स्वरूपानाम). याचा अर्थ हत्तीचे किंवा घुबडाचे डोके असलेले मासे ‘मत्स्यअश्व’ या कल्पनेशी जवळीक दाखवतात.

वैदिक साहित्य किंवा रामायण, महाभारतासारखी महाकाव्ये यातून ‘इहामृग‘ ही संकल्पना कशी डोकावते, याचे थोडे थोडे विस्कळीत का होईना, पण काही संदर्भ आणि त्याची उदाहरणे आपल्याला दिसतात. यावरून ही संकल्पना तत्कालीन कलाकारांना माहिती तर होतीच, शिवाय ती त्यांच्या आवडीचीही असावी हे म्हणायला जागा आहे.
शिल्प आणि चित्रांचा संदर्भ :-
साहित्यातील संदर्भ पाहिल्यानंतर आपण या काल्पनिक विश्वातील प्राण्यांचे अजून कुठे कुठे संदर्भ येतात हे शोधायला गेलो की, अर्थातच कलेमध्ये त्याचे पडलेले प्रतिबिंब स्पष्ट दिसून येते. मुळात साहित्यात जे संदर्भ आले आहेत त्याचे रूपांतर कलेत होणे हे अगदी क्रमप्राप्तच आहे म्हणा. ‘मिथीकल अॅनिमल्स इन इंडियन आर्ट’ या आपल्या पुस्तकात श्री. के. कृष्णमूर्ती यांनी या संकल्पनेचा सगळा ऐतिहासिक आढावा घेतलेला आहे. त्या पुस्तकावर आधारित असलेले आणि अजून बरेच निरनिराळे संदर्भ जोडून प्रसाद प्रकाशनाने ‘मिथक शिल्पे’ हे पुस्तक प्रकाशित केले. या पुस्तकात के. कृष्णमूर्ती यांनी विचारात घेतलेली ‘इहामृग’ ही संकल्पना, त्याचे कलेत पडलेले प्रतिबिंब हे मांडले आहेच, पण त्याशिवाय श्री. ढाकी यांनी पुढे मांडलेली ‘व्याल’ ही संकल्पना आणि त्याचे हिंदुस्थानी कलेत दिसणारे रूप याचासुद्धा विचार केला आहे. तसेच के. कृष्णमूर्ती यांनी सांची, अमरावती, नागार्जुनकोंडा इथली शिल्पे आणि अजिंठा लेणीतील भित्तिचित्रे यांचाच समावेश त्यांच्या पुस्तकात केला आहे. मात्र मराठी पुस्तकात विविध लेण्यांमध्ये दिसणारे हे काल्पनिक प्राणी आणि पुढे मंदिरांवर विपुल प्रमाणावर दिसणाऱया व्याल प्रतिमा यांचासुद्धा समावेश केलेला आहे.
के. कृष्णमूर्ती यांनी त्यांच्या पुस्तकात म्हटले आहे की, त्यांनी फक्त इ.स.च्या 6व्या शतकापर्यंतचा कालावधी लक्षात घेऊन त्या कालावधीत आढळणारी मिथक शिल्पे विचारात घेतली आहेत. कारण पुढे श्री. ढाकी यांनी ‘व्याल’ ही संकल्पना त्यांच्या पुस्तकातून विस्तृतपणे उलगडून दाखवली. त्यांनी ‘द व्याल फिगर्स ऑन द मेडिएव्हल टेंपल्स ऑफ इंडिया’ या त्यांच्या पुस्तकात ‘व्याल’ या संकल्पनेबद्दल खूप सखोल अभ्यास मांडला आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार अंदाजे इ.स.च्या 4थ्या शतकापासून ‘व्याल’ ही संकल्पना विकसित झाल्याचे दिसून येते.
वर म्हटल्याप्रमाणे श्री. के. कृष्णमूर्ती यांनी इहामृगाचे कलेतील संदर्भ शोधण्यासाठी भारहूत, सांची, अमरावती, नागार्जुनकोंडा, मथुरा आणि गांधार इथली शिल्पे आणि अजिंठा लेण्यांतली चित्रे यांचा विचार इथे केला आहे. हिंदुस्थानी कलेवर परदेशी कलेचा किती प्रभाव पडतो हेसुद्धा इथे दिसून येते. शिल्पातून दिसणारे हे इहामृग म्हणजे कलाकारांच्या अफलातून कल्पनाशक्तीतून निर्माण झालेला एक सुंदर कलाविष्कार आहे. प्राचीन कलेत अशा काल्पनिक किंवा पौराणिक प्राण्यांची विविधता फार मोठी आहे. ते प्राणी किती आहेत आणि कोणकोणते आहेत याची एक झलक बघायची म्हटली तर आपल्या समोर कलेचे एक मोठे दालनच उघडले जाते. ज्यात पंख असलेला सिंह, चोच असलेला सिंह, शिंग असलेला सिंह, किन्नर-किन्नरी, चेहरा माणसाचा आणि शरीर सिंहाचे किंवा हत्तीचे असा प्राणी, अर्धा माणूस आणि अर्धा घोडा, हत्तीचे तोंड असलेला माणूस, बकरीचे तोंड असलेला माणूस, सिंह-मगर-माशाची शेपूट असा संयुक्त प्राणी, पंख असलेले हरीण, पंख असलेला बैल, हत्तीचे तोंड आणि पंख असलेला बैल, पंख असलेली बकरी, गरुडाचे शरीर आणि पंख असलेला पुरुष किंवा स्त्री, नरसिंह आणि त्याला पंख, सिंह-मगर, हत्ती-मासा, हरणाला माशाची शेपूट, बकरीला माशाची शेपूट, हत्तीला विंचवाची शेपूट, सिंहाचे पंजे असलेला बैल आणि त्याला माशाची शेपूट, माशाची शेपूट असणारी जलपरी, घोडय़ाचे तोंड असलेला समुद्री मासा ज्याला हॉर्सफिश असे म्हणतात, पंख असलेली बकरी आणि तिला माशाची शेपूट असे अक्षरश अगणित व्याल प्रकार आपल्या प्राचीन हिंदुस्थानी कलेत दिसून येतात.
या काल्पनिक संमिश्र प्राण्यांबद्दल कलाकारांच्या मनात काय कमालीचे आकर्षण होते आणि त्याचबरोबर त्यांच्या कल्पनाशक्तीची झेप किती अफाट होती हे यावरून दिसून येते. कुठल्याही दोन भिन्न प्राण्यांच्या शरीराचे विशिष्ट भाग एकत्र करून एक नवीनच प्राणी सादर करायचा असा जणू छंदच त्यांना जडला होता. या संकल्पनेचे कलेमध्ये सादरीकरण करताना या कलाकारांची कल्पनाशक्ती किती अचाट होती याची जाणीव, हे सगळे व्याल बघताना आपल्याला प्रकर्षाने होते. हे सगळे इतक्या मोठय़ा संख्येने असलेले आणि विविध प्रकारचे प्राणी आपल्यासमोर सांगताना त्यांची वैशिष्टय़ानुसार निरनिराळ्या गटात विभागणी केली आहे. हे एवढे सगळे विविध प्रकार एकत्र करताना त्यांची काही वैशिष्टय़े लक्षात घेऊन ती इथे सादर केली आहेत. त्यांचे अवयव किंवा कुठल्या प्राण्याचे अवयव त्यांना जोडले आहेत हे विचारात घेऊन त्यांचे साधारण वर्गीकरण केले आहे. के. कृष्णमूर्तींनी त्यांच्या पुस्तकात हे इहामृग किंवा व्याल मांडताना ते साधारणत तीन प्रकारांत विभागले आहेत. आकाशगामी प्राणी (व्योमचरिन्), जमिनीवरचे प्राणी (भूचरिन्), आणि पाण्यातले प्राणी (जलचरिन्) असे हे तीन प्रकार होत. या प्राण्यांना दाखवलेल्या विशिष्ट अवयवांमुळे त्यांचे वर्गीकरण अशा तीन प्रकारांत केलेले आहे. यातले काही प्राणी दोन गटांतसुद्धा मोडतात. मूलत तो प्राणी कोण आहे आणि मग त्याला कुठले अवयव जोडले आहेत याचा विचार इथे केला आहे. मूलत तो प्राणी जर जमिनीवरचा असेल आणि त्याला पंख जोडले असतील तर त्याचा समावेश आकाशगामी प्राण्यात केला आहे. त्याचे बदललेले रूप कोणते आहे यावर तो कुठल्या गटात बसतो हे ठरवले आहे. या काही तांत्रिक बाबी जरी असल्या तरी यातली नाटय़मयता, त्या प्राण्यांचे नवीन तयार झालेले रूप, त्यातल्या काही प्राण्यांचे परकीय कलेशी असलेले साधर्म्य किंवा पूर्णपणे परदेशी कलेतच त्यांचा असलेला आढळ यांचा ऊहापोह त्या त्या वेळी केलेला आहे. के. कृष्णमूर्तींनी तर अनेक प्राण्यांच्या कथा, लोककथा यांचे खूप रंजक वर्णन केले आहे. यातल्या प्रत्येक प्रकारातील गमतीशीर प्राणी आपण इथे बघणार आहोत.
मिथकशिल्पांचे प्रकार :-
आपण बघितले की, के. कृष्णमूर्तींनी त्यांच्या पुस्तकात हे इहामृग, व्याल किंवा जे काल्पनिक प्राणी वर्णन करून सांगितले आहेत, ते साधारणत तीन प्रकारांत विभागले आहेत. आकाशगामी प्राणी (व्योमचरिन्), जमिनीवरचे प्राणी (भूचरिन्) आणि पाण्यातले प्राणी (जलचरिन्). काल्पनिक प्राणी चित्रित किंवा शिल्पांकित करताना त्या प्राण्यांना दाखवलेल्या विशिष्ट अवयवांवरून त्यांचे वर्गीकरण तीन प्रकारांत केलेले आहे. मूलत तो प्राणी कोण आणि त्याला कुठले अवयव जोडले आहेत याचा विचार करून हे प्रकार ढोबळमानाने ठरवले गेले आहेत. प्राणी कुठल्या गटात बसतो वगैरे तांत्रिक बाबी सोडल्या जरी असल्या तरी यातली नाटय़मयता, प्राण्यांचे नवीन रूप, काही प्राण्यांचे परकीय कलेशी असलेले साधर्म्य यांचा ऊहापोह के. कृष्णमूर्तींनी केलेला आहे. या तीन वर्गीकरणांतला पहिला प्रकार आहे तो आकाशात उडणारे प्राणी. त्यांना ‘व्योमचरिन्’ असे म्हटले आहे.

आकाशगामी (व्योमचरिन्) – आकाशगामी म्हटले की, साहजिकच उडणे ही क्रिया अपेक्षित आहे आणि उडणे या क्रियेशी जोडला गेलेला अवयव म्हणजे पंख. त्यामुळे प्राणी जरी संमिश्र असला तरी त्याला पंख दाखवले की, तो उडणारा आहे हे लगेच समजून येते. ‘आकाशगामी’ या नावातच स्पष्ट होतं की, असे संयुक्त, काल्पनिक प्राणी (व्याल) ज्यांना पंख दाखवलेले असतील, त्यामुळे या प्रकारात जे प्राणी समाविष्ट केले आहेत त्यांचे प्रकार पुढीलप्रमाणे बघता येतील. यामध्ये पंखधारी सिंह, पंखधारी आणि शिंग असलेले सिंह, ग्रिफिन म्हणजे पंखधारी गरुडरूपी सिंह, पंखधारी हरीण, काळवीट, पंखधारी घोडे, पंखधारी हत्ती, किन्नर आणि किन्नरी, पंखधारी आणि हत्तीमुखी बैल म्हणजे पंखधारी गरुडरूपी सिंह, पंखधारी पाणमांजर, पंखधारी बकरी, सिंहमुखी कोंबडा, पंखधारी आणि सिंहाचे शरीर असलेले पुरुष आणि स्त्राr, पाच फणे असलेला नाग आणि गरुड, पक्ष्याचे शरीर असलेली स्त्राr. एवढय़ा विविधतेचे प्राणी आपल्याला ‘आकाशगामी’ म्हणजे ‘व्योमचरिन्’ या श्रेणीमध्ये सापडतात. या प्राण्यांचे शिल्पांकन किंवा चित्रांकन कुठे केलेले आहे तेसुद्धा बघू या.

हिंदुस्थानी साहित्यात याचा उल्लेख ‘वाल्मीकी रामायणा’त ‘सिंहा: पक्षगम:’ असा केलेला आहे (रामायण, किष्किंधा 42, 16) त्या उल्लेखानुसार या पंखधारी सिंहांचे वास्तव्य जिथे सिंधू नदी समुद्राला मिळते त्या ठिकाणी असलेल्या सोमगिरी पर्वतावर होते. या स्थानाला पश्चिम दिशेचे टोक म्हणजे शेवटचे स्थान असे म्हटलेले आहे. यावरून असाही एक अंदाज बांधता येतो की, लेखकाने इराण, मेसोपोटेमिया इथल्या पारंपरिक कलाकृतींच्या पार्श्वभूमीवर हे लेखन केले असावे. कारण त्या प्रदेशात अशा अजस्र आकाराची शिल्पनिर्मिती केली जात असे. या शिल्पकृतींच्या कथा त्या देशांतून समुद्रमार्गे येणारे व्यापारी आणि प्रवासी यांच्याकडून लेखकाने ऐकलेल्या असणार आणि त्यानुसार त्याने आपल्या लिखाणात त्यांचा उल्लेख केलेला असणार. याचेच काही नमुने एका उत्खननात सापडले आहेत. इ.स.पूर्व 5 व्या शतकातल्या अॅकिमेनिड काळातला तो नमुना आहे. इकबाटन इथे झालेल्या उत्खननात काही सोन्याची भांडी मिळाली, ज्यावर पंखधारी सिंहाचे शिल्प कोरलेले सापडले. हमादान इथल्या उत्खननात कपडय़ावर लावायच्या सोन्याच्या बटणाच्या रूपात पंखधारी सिंह सापडले. तसेच पर्सिपोलीस इथल्या उत्खननात तलवारीच्या म्यानावर पंखधारी सिंहाची आकृती कोरलेली मिळाली.
मानवी चेहऱ्याचा सिंह :-
माणसाचा चेहरा आणि सिंहाचे शरीर असे संमिश्र शिल्प आपल्याला सांची मथुरा,भारहूत आणि अमरावती येथे बघायला मिळते. अशा प्रकारचे माणसाचे तोंड आणि सिंहाच्या शरीर असलेले शिल्प ( क्वचित काही वेळा ससाणा किंवा मेंढ्याचे तोंड ) इजिप्शीयन स्कींफचे प्राथमिक रूप असू शकते. कारण ईजिप्शीयन स्किंफ हा कायम पुरुष रूपात दाखवतात आणि त्याचे शरीर सिंहाचे तर तोंड माणसाचे असायचे. ग्रेट स्कींफच्या निर्मितीची नेमकी तारीख सांगता येणार नाही. पण त्याची निर्मिती दुसरा पिरॅमिड बांधणाऱ्या खाफ्रा राजाच्या राजवटीत झालेली आहे असे समजले जाते. ग्रेट स्कींफच्या काळापासूनच पुढे इतर सर्व आकाराचे स्कींफ ओळखले जातात. त्यामुळे गेट स्कींफ हा एक प्रकारे सर्वात प्राचीन समाजाला जातो. यातील सर्वात मोठा आकाराचा 'अलाबास्टर स्कींफ' हा रामसेस हे दुसरा त्याच्या राजवटीत निर्माण झाला. हा स्कीम सन १९१२ मध्ये मॅके या अभ्यासकाला मेम्फिस इथे सापडला. सर्वात प्रसिद्ध स्कींफ म्हणजे कर्नाक इथला क्रीओस्फिक्सेस. तो नदीपासून ते मंदिरापर्यंत पवित्र मार्गाची रुपरेषा ठरवतो.ग्रिफिन (पंखधारी गरुडरूपी सिंह)
सिंहाचे शरीर, गरुडाची किंवा पोपटाची चोच आणि गरुडाचे पंख असलेला हा संमिश्र प्राणी. या प्राण्यांचे शिल्पांकन आपल्याला सांची इथे बऱयाच प्रमाणावर आढळते. चारही पाय दुमडून बसलेला हा प्राणी आपले पंख फुलवून मागे वळून बघतो आहे असे हे शिल्प. इथे सिंहाची आयाळ ठसठशीतपणे दाखवलेली आहे. सांची स्तूपाच्या पश्चिम तोरणावर समोरच्या बाजूला एकतर मागच्या बाजूला दोघे पाठीला पाठ लावून बसलेले ग्रिफिन आपल्याला दिसतात. इथेच 2 ाढमांकाच्या स्तूपाच्या कठडय़ावर अशा ग्रिफिनचे शिल्पांकन केलेले आहे. अशाच प्रकारचा एक ग्रिफिन मथुरा कलेमध्येसुद्धा बघायला मिळतो.

हिंदुस्थानी कलेच्या बाबतीत बोलायचं झालं तर ग्रिफिन हे नंतरच्या काळात दिसणाऱया श्येन, गरुड आणि शुक-व्याल या संकल्पनेचे प्राथमिक रूप म्हणता येईल. या ग्रिफिनच्या काही सुरस कथा आहेत.
मिथक शिल्पे – आकाशगामी :-
आकाशगामी म्हणजेच व्योमचरिन् या प्रकारात एकापेक्षा एक आकर्षक आणि विस्मयकारक प्राणी भरलेले आहेत. त्यातल्या ग्रिफिनपर्यंत आपण येऊन पोचलो होतो. भारतीय कलेच्या बाबतीत बोलायचं झालं तर ग्रिफिन हे नंतरच्या काळात दिसणाऱया श्येन, गरुड आणि शुक-व्याल या संकल्पनेचे प्राथमिक रूप म्हणता येईल. भारतीय कलेत दिसणाऱया ग्रिफिनच्या शिल्पासारखेच ग्रिफिनचे एक शिल्प मिलेटस इथल्या ग्रीक देवता अपोलोच्या मंदिरातील एका स्तंभावर कोरलेले दिसते. त्याशिवाय इ.स.पूर्व 4-5 व्या शतकातील तिओस आणि थ्रेसच्या नाण्यांवरसुद्धा ग्रिफिनचे शिल्प आढळून येते.
ग्रिफिनबद्दल काही सुरस कथा प्रसिद्ध आहेत. ग्रिफिन हे जगाच्या उत्तर टोकावर हायपरबोरीयनचे शेजारी म्हणून वास्तव्याला असतात. ते सोन्याच्या खजिन्याचे राखणदार असतात. या खजिन्यावर एकच डोळा असलेल्या अरिमास्पियन्सचे लक्ष असते. ते हा खजिना चोरण्याच्या प्रयत्नात असतात. ग्रिफिन, हायपरबोरीयन आणि अपोलो यांचेसुद्धा सुरेख संबंध या कथांमधून येतात. अपोलो या ग्रीकांच्या देवतेने हायपरबोरीयनसमवेत काही काळ घालवला होता. त्यामुळे हायपरबोरीयन्स हे पवित्र समजले गेले. कालांतराने अपोलो आणि हेलीयस या सूर्यदेवतांचे एकत्रीकरण झाले किंवा अपोलोलाच पुढे हेलीयस असे संबोधले जाऊ लागले तेव्हा हे ग्रिफिन हेलीयसचे सारथी झाले होते. हेलीयसचा रथ हे ग्रिफिन आकाशमार्गे ओढून नेतात असे वर्णन अनेक कथांमधून येते.
एखाद्या प्रांतातल्या लोकप्रिय झालेल्या लोककथा, त्यातले संदर्भ तसेच ठेवून किंवा त्यात काही जुजबी बदल करून जगाच्या विविध भागात प्रसारित होत असतात. ग्रिफिनच्या बाबतीत प्रसिद्ध असलेल्या अशाच काही कथांमधून ग्रिफिन्सचे वास्तव्य उत्तर भारतात असल्याचेही उल्लेख आलेले आहेत. उत्तर भारतात ग्रिफिन्सचे वास्तव्य होते. तिथे त्यांनी वाळवंटातून सोनेरी वाळू खणून काढली. त्यामुळे साहजिकच त्यांच्या शेजाऱयांचे त्या सोन्याच्या वाळूवर लक्ष गेले. ती वाळू त्यांना चोरायची तर होती, पण त्याच्या रक्षणासाठी बसलेले हे ग्रिफिन्स फारच उग्र आणि भयंकर होते. पण त्या शेजाऱयांना तर ती सोनेरी वाळू हवी होती. मग या ग्रिफिन्सच्या शेजाऱयांनी सोनेरी वाळू चोरण्यासाठी एक शक्कल लढवली. त्यांनी ग्रिफिन्सना आवर्जून खायला आणून दिले आणि जेव्हा ग्रिफिन्स खाण्यात व्यग्र होते, तेव्हा त्यांनी ती सोनेरी वाळू चोरून नेली.

पंखधारी हरीण किंवा काळवीट
पंखधारी हरीण किंवा काळविटाची दोन शिल्पे आपल्याला सांचीला दिसतात. सांची स्तुपाच्या उत्तर तोरणावर पाठीला पाठ लावून बसलेल्या या दोन पंखधारी हरणांचे शिल्प आहे. टोकदार शिंगे असलेल्या या हरणांनी आपले पंख उंचावलेले आहेत. अतिशय मोहक आणि आकर्षक असे हे शिल्प आहे. यांनाच पुढे हरीण-व्याल म्हणून संबोधले जाऊ लागले. याच तोरणाच्या मागच्या बाजूवर पंखधारी काळविटाचे एकमेव शिल्प आहे. यालासुद्धा हरीण-व्याल असेच म्हणतात. सांचीसारखेच अमरावती आणि मथुरा इथे आपल्याला पंखधारी हरीण (हरीण-व्याल) शिल्पांकित केलेले दिसून येतात.
पंखधारी घोडा
उडणारे घोडे किंवा पंख असलेल्या घोडय़ाचे उल्लेख भारतीय आणि परकीय साहित्यातून जरी विपुल प्रमाणात दिसत असले, तरी त्या मानाने त्यांचे कलेमध्ये शिल्पांकन फारच थोडे दिसते. अशी शिल्पे दुर्मीळच म्हणायला हवीत. मात्र एक सुंदर शिल्प आपल्याला सांची स्तुपाच्या कठडय़ावर दिसते आणि दुसरे शिल्प अमरावती कलेमधे दिसून येते. हिंदू पौराणिक कथांमधून दिसणारा ‘उच्चैश्रवा’ नावाचा घोडा, हा या पंखधारी घोडय़ाचे मूळ रूप असण्याची शक्यता आहे.
बौद्ध साहित्यात बर्याच जातक कथा आहेत. या कथांमधून गौतम बुद्धाचे पूर्वीचे जन्म आणि त्यात त्याने समाजासाठी केलेले योगदान सांगितलेले असते. त्या जातक कथांच्या विषयानुसार त्यांना विविध नावे दिलेली आहेत. अशाच एका ‘वलहंस जातका’त या पंखधारी घोडय़ाचा उल्लेख येतो. या घोडय़ाचा संदर्भ बौद्ध संकल्पनेतील एका रत्नाशी आहे. तो असा की, बौद्ध संकल्पनेनुसार चक्रवर्तीपदाची काही लक्षणे आहेत. ज्यानुसार चक्रवर्ती हा सप्त रत्नांनी सुशोभित केलेला असतो. म्हणजेच त्याच्या बाजूने सात रत्ने दाखवलेली असतात. त्यातील एक रत्न म्हणजे वलह श्रेणीतला एक घोडा असतो. आणि म्हणून हा घोडा या जातककथेत दिसून येतो. या जातककथेनुसार हा घोडा, ‘विदुरपंडित’ जातकातल्या पुणक यक्षासारखा आकाशात उडू शकतो. बहुदा या कथांमधून आलेल्या उडणाऱया घोडय़ांच्या कल्पनेवरून, शिल्पकारांना प्रेरणा मिळाली असावी आणि म्हणून त्यांनी पुढे अशा उडणाऱया घोडय़ांची शिल्पे निर्माण केली असावीत.ग्रीक पुराणकथांमधूनही उडणाऱया घोडय़ाचे उल्लेख येतात. तिथे पेगॅसस नावाच्या पंख असलेल्या घोडय़ाची कथा आहे. पॉसिडॉनचा मुलगा असलेला हा पेगॅसस. या पेगॅससचा एका पाण्याच्या झऱयाशी संबंध आलेला आहे. त्याच्या जन्माची कथा मोठी रंजक आहे. त्याच्या आईचे डोके पर्सियसने कापले. त्यानंतर तिच्या रक्तबंबाळ शरीरातून हा पेगॅसस जोरदार उसळी मारून बाहेर पडला. तो फारच उत्तेजित झालेला होता. जन्माला आल्यावर त्याने आकाशात उंच झेप घेतली. तो पहिल्यांदा जिथे विश्रांतीसाठी थांबला ते ठिकाण म्हणजे कॉरीन्थचे एक्रोपोलीस होते. नंतर तो जेव्हा पेरेनाच्या कारंज्यापाशी पाणी पिण्यासाठी थांबला तेव्हा अथेन आणि पॉसिडॉनच्या मर्जीने बेलेरोफोन याने पेगॅससला शांत केले आणि तो त्याच्यावर स्वार झाला. याच पेगॅससवर आरूढ होऊन बेलेरोफोनने युद्धात मोठमोठे विजय मिळवले. चिमेरावर मिळवलेला विजय हा त्यातल्याच एक होय. पुढे पेगॅससने त्याच्या बेलेरोफोन या स्वाराला धुडकावून लावले आणि तो उंच उंच उडत पार स्वर्गात गेला. तिथे त्याने झ्यूसबरोबर वास्तव्य केले. वीज आणि ढगांचा गडगडाट आणण्याच्या कामात त्याने झ्यूसला मोलाची मदत केली. काही लेखकांनी पेगॅससला इरॉस किंवा म्युझेसचा अश्व म्हणून संबोधले आहे. पेगॅससने ज्या ठिकाणी हेलीकॉनला आपल्या खुराने मारले, त्या ठिकाणी पाण्याचा झरा उत्पन्न झाला. ज्याला ‘अश्वाचा झरा’ असे नाव पडले. ट्रोजनजवळ असलेला हिप्पोक्रीन नावाचा झरा आणि अक्रोकोरीन्थस जवळचा पिरेन झरा यांच्या उत्पत्तीची कथासुद्धा अशीच सांगितली जाते.
सोळाव्या शतकानंतर मात्र मंदिरं स्थापत्यातील बाह्य नक्षीकाम मंदावले आणि आपसूकच व्यालमूर्ती सुद्धा मंदिर स्थापत्यातुन नाहीश्या झाल्या.







दक्षिण भारतातील बहुतेक मंदीराच्या स्तंभावर सिंह, घोडा किंवा हती यांचे अवयव एकत्र करुन मुर्तीबध्द केलेले व्याल बघायला मिळतात. जळकंठेश्वर मंदीराच्या व्याल शिल्पात त्याच्यावर आरुढ झालेला स्वार दाखवला आहे.
मिथक शिल्पे – किन्नर किन्नरी :-
ग्रीक पुराणकथांमधील पंखधारी घोडा अर्थात पेगॅससबद्दल काही कथा आपण बघितल्या. याच पंखधारी घोडय़ाबद्दल अजून एक बाब म्हणजे कॉरिन्थच्या नाण्यांवर पंख असलेल्या पेगॅससचा छाप दिसून येतो. इ.स.पूर्व 4 थ्या शतकातील कॉरिन्थच्या चांदीच्या नाण्यावर पंखधारी पेगॅसस कोरलेला आहे. त्याच कालखंडात निर्माण झालेल्या लाम्पसॅकसच्या नाण्यांच्या मागच्या बाजूवरसुद्धा पंखधारी अश्वाचे शिल्प बघायला मिळते. म्हणजेच कलेमध्ये या पंखधारी घोडय़ाचे स्थान जसे शिल्पांमध्ये आहे तसेच ते नाण्यांवरसुद्धा दिसून येते. पंखधारी घोडय़ासारखा अजून एक चमत्कारिक प्राणी आपल्याला दिसतो तो म्हणजे पंखधारी हत्ती.
अमरावती, सांची, नागार्जुनकोंडा इथल्या उडणाऱया हत्तींची शिल्पे बुद्धजन्माच्या चमत्काराची घटना दाखवतात. या शिल्पांमधे जरी हत्तींना पंख दाखवले नसले तरीसुद्धा त्यांच्या शिल्पांवरून ते आकाशात विहार करताहेत हे स्पष्टपणे समजून येते. अर्थात हत्तींना पंख दाखवणे हे काही हिंदुस्थानी कलाकारांना अगम्य नव्हते. अमरावती इथल्या शिल्पांमधून आपल्याला पंख असलेले हत्ती शिल्पांकित केलेले बघायला मिळतात.
हिंदुस्थानी पौराणिक कथांमधील इंद्राचा ऐरावत हा हत्ती आणि बौद्ध धर्मातला ऐरावत हे दोन्हीही हत्ती खूप उंच, अगदी स्वर्गापर्यंत भरारी घेतात असेच समजलेले आहे. याच ऐरावताच्या रूपावरून प्राचीन हिंदुस्थानी कलाकारांना हत्तींना पंख दाखवण्याची कल्पना सुचली असावी. पावर्ती सम्राटाची सात लक्षणे म्हणून जी रत्ने दाखवतात, त्यापैकी हत्ती हे एक रत्न आहे. ज्याला ‘उपोसतन श्रेणीचे’ रत्न समजले जाते. कलिंगबोधी जातकामधील राजपुत्र हत्तीवर बसून आकाशात फिरून येतो अशी कथा येते, तर वेस्संतर जातकानुसार पाऊस पाडणारा हत्ती हा एक स्वर्गीय हत्ती दाखवला असून तो उडू शकतो असे उल्लेख येतात. उडणे ही ािढया पक्ष्यांशी संबंधित असल्यामुळे शिल्पांमध्ये जमिनीवरील प्राण्याच्या शरीराला पक्ष्याचे पंख जोडलेले दाखवून तो एक उडणारा प्राणी म्हणून दाखवला जातो. हत्ती, हत्तीशास्त्र यावर ग्रंथनिर्मितीसुद्धा झालेली आहे. त्यातलाच एक ‘मातंगलीला‘ हा हत्तीशास्त्रावरील महत्त्वाचा ग्रंथ. या ग्रंथात हत्ती आणि त्यांना असलेल्या पंखांची चित्रे काढलेली आहेत. तंजावर इथल्या सरस्वती महाल ग्रंथालयात हा ग्रंथ बघायला मिळतो.
पंखधारी हत्तींनंतर एक महत्त्वाचा प्रकार आपल्याला बघायला मिळतो तो म्हणजे किन्नर आणि किन्नरी हा होय. त्यांच्याबद्दल खूप रंजक अशा कथा प्रसिद्ध आहेत.
किन्नर आणि किन्नरी
किं-नर? म्हणजे हे नर आहेत का ? किन्नर या नावातच हा प्रश्न विचारला आहे. माणसासारखे दिसणारे, पण मनुष्यप्राणी नाहीत असे हे जीव आहेत. अर्धा माणूस, अर्धा घोडा आणि पक्षी असे स्वरूप असणारे हे किन्नर. हे किन्नर यक्ष, गंधर्व या श्रेणीत मोडतात. प्राचीन हिंदुस्थानी कलेमध्ये किन्नरांचे आकर्षक शिल्पांकन केले आहे. तिथे त्यांचे दर्शन अनेकदा होते. सांची, भारहूत, अमरावती, नागार्जुनकोंडा, मथुरा इथल्या शिल्पांमधून आपल्याला बऱयाच ठिकाणी किन्नर शिल्पे दिसून येतात. अजिंठा चित्रकलेतही किन्नरांचे चित्रांकन केलेले आहे. बऱयाचदा हे किन्नर, स्तूपाच्या भोवती कोरलेले दिसतात. इथे ते स्तूपाची पूजा करताना दाखवलेले असतात. हातात फुलांचा हार किंवा हातात तबक आणि त्या तबकात फुले घेऊन ते स्तूपाच्या पूजेला जाताना दाखवतात. ते बोधीवृक्ष, धर्मपा यांच्या समवेत दिसतात, तर काही ठिकाणी ते हातात तंतुवाद्य घेतलेले दिसतात. प्राचीन हिंदुस्थानी कलेत किन्नरांचे शिल्पांकन विपुल प्रमाणात बघायला मिळते.
किन्नरांबद्दल अजून काही गमतीशीर गोष्टी आहेत.
शरभ :-






किर्तीमुख
जालंधर नावाचा एक राक्षस होता. त्याने ब्रह्मदेवाची तपश्चर्या करुन त्याना प्रसन्न करुन घेतले आणि वरदान प्राप्त करुन घेतले. त्याने एका जंगलात मोठा राजवाडा बांधून घेतला आणि राक्षसांची सेना तयार केली. मात्र यामुळे तो उन्मत्त बनला. रोज संध्याकाळी तो रथात बसून भ्रमण करत असे आणि वाटेत दिसणार्या प्रजाजनांवर अत्याचार करत असे. यामुळे सर्वजण त्रासून गेले. एके दिवशी जालंधर फिरत असताना त्याला एक अनोखा सुगंध आला, त्या दिशेने तो गेला असताना त्याला एक अप्रतिम सुंदर स्त्री दिसली. जंगलात फिरणार्या त्या देखण्या स्त्रीला पाहून जालंधरने विचारले कि 'हि सुम्दरी कोण आहे?'. त्यावर एक सेवक म्हणाला कि भगवान शंकराची पत्नी पार्वती आहे. त्यावर जालंधरने ठरवले कि हिच्याशी विवाह करायचा आणि तीला पट्टराणी बनवायचे. जालंधर राक्षसाने पार्वतीस लग्नाची मागणी घालण्यास राहू ला आपला दूत म्हणून पाठवले. राहू कैलासावर गेला, आणि त्याने जलंधरासाठी पार्वतीला मागणी घातली. हे ऐकून संतापलेल्या महादेवाच्या तिसऱ्या डोळ्यातून एक भीषण आक्राळविक्राळ प्राणी तयार झाला, त्याचे रुप विचीत्र होते. चेहरा रुंद, मात्र हातपाय बारीक होते.ज्याचा चेहरा सिंहासारखा होता, त्याची जीभ हलत होती, केस उभे होते आणि डोळे विजेसारखे होते (नरसिंहसारखे दिसत होते), जन्म झाल्या झल्या हा प्राणी 'भुक, भुक' म्हणून ओतडू लागला. आणि तो राहूवर धावून गेला. त्या प्राण्यांचे महाभयंकर रूप पाहून राहूची घाबरला ! मग करेल तरी काय..त्याने महादेवाच्या पायावर डोकं ठेवल. त्यामुळे महादेवाने राहूला माफ केले. राहू तिथून निघून गेल्यावर महादेव परत ध्यानस्थ झाले. मात्र त्या प्राण्याची भुक तशीच होती. त्याने महादेवाला विचारले, मी खाऊ तरी काय? महादेवांनी सांगितले, जो पर्यंत तुझ्या खाण्याची व्यवस्था होत नाही तोपर्यंत खा स्वतःलाच.! देवाधिदेव महादेवाचा हुकूम माणून ह्या प्राण्यांने स्वतः ला पायापासून खायला सुरवात केली आणि खात खात त्याचे फक्त डोकेच उरले. तरीही त्याची भूक भागली नाही. महादेवाचे ध्यान संपल्यानंतर त्यांना दिसले ते फक्त त्याचे डोके!! महादेव त्याला म्हणाले कि माझ्या कुटीचे रक्षण करण्यासाठी तुझे जिवंत रहाणे आवश्य्क आहे, तेव्हा तु असाच माझ्या दारापाशी द्वारपाल म्हणून रहा. अश्याप्रकारे कीर्तिमुख प्रहरी बनला आणि स्वतःमध्ये शिव तत्व धारण करुन शिवशंकराचा प्रहरी बनला. यामुळे शिव मंदीराच्या द्वाराशी कीर्तिमुख बसवले असते, कारण भगवान शिव त्याची विनंती मान्य करतात आणि आपली इच्छा पुर्ण करतात. स्कंदपुराण आणि पद्मपुराणात या दोन पुराणांमध्ये असे म्हटले आहे की शिवाला समर्पित मंदिरांच्या प्रवेशद्वारावर कीर्तिमुख दिसले पाहिजेत आणि भक्त गर्भगृहात प्रवेश करण्यापूर्वी त्यांची प्रथम पूजा केली पाहिजे. म्हणूनच ते मंदिराच्या उंबरठ्यासमोर आढळते, जिथे भक्त त्यावर पाणी शिंपडतात आणि त्यावर पाऊल ठेवू नये याची काळजी घेतात.

जालंधराने मागून-मागून कोणता वर मागितल तर जेव्हा भूक लागेल तेव्हा खाण्यासाठी काहीतरी उपलब्ध पाहिजे. महादेवाने त्याला स्वत:च शरीर खायला सांगितले,त्याने पायापासून खायला सुरवात केली उरलं फक्त तोंड आणि डोकं...तरीही त्याची भूक संपली नाही....! देवा अजून भूक लागली...म्हटल्यावर भोळ्याशंकराने याला जालीम उपाय सांगितला की जिथं जिथं मी असेल, तिथं तिथं माझ्या दारात येऊन बस आणि येणार्या सर्वांची पाप खाऊन टाक...!!! कलियुगात माणसाची पापे हि न संपणारी आहेत. आणि म्हणून या किर्तीमुखाच शिल्प मंदिरा च्या दारात कोरण्याची प्रथा रुढ झाली !!

























कीर्तिमुखाला ग्रासमुख (पश्चिम भारत) किंवा राहुरमुख (पूर्व भारत) असेही म्हणतात. ते काळ किंवा काळाचे प्रतिनिधित्व करते. ग्रासणे या शब्दाचा अर्थ गिळंकृत करणे असा होतो, याचा संदर्भ राहूशी आहे ज्याने सूर्य आणि चंद्र यांना गिळले म्हणून त्यांचे ग्रहण होते अशी कल्पना आहे. काल हा देखील सर्वात मोठा भक्षक आहे,, जो शेवटी सर्वकाही गिळंकृत करतो. अशाप्रकारे, कीर्तिमुखाच्या चेहऱ्याशी जोडलेली तीन नावे समानार्थी आहेत. मंदिरांवर चित्रित केलेले कीर्तिमुखाचे तीन प्रकार आहेत: प्रथम सिंहाचा चेहरा जे राहूचे डोके (जे ड्रॅगनसारखे दिसते, काही मान्यतेनुसार राहूचा आकार सर्पासारखा आहे असे मानतात), आणि मृत्युचे डोके (काल). सिंह, जो सर्व वाईटाचा नाश करणार्याचे प्रतीक आहे. उपनिषद/वेदांतानुसार, परमेश्वराने दुष्टांच्या नाशासाठी सिंहाचे रुप धारण केले होते. न्रूसिंह अवतार हे त्याचे उदाहरण ज्यामध्ये भगवान विष्णुंनी सिंहाच्या चेहरा धारण केला तर शरीर नराचे होते, याच विष्णु नारायणांनी समुद्र मंथनाच्या प्रसंगात राहुला सुदर्शन चक्राने मारले, मात्र अमृताच्या प्रभावाने त्याचे शीर शिल्लक राहीले तर शरीर एक वेगळा जीव झाले. कीर्तिमुखाच्या रुपात काही प्रतिक मानली जातात. ऋग्वेदातील उल्लेखाप्रमाणे जगाला उर्जा देणारे हे मुख आहे.त्याला असणारी तीन शिंगे म्हणजे सिंह, राहु आणि काल याची प्रतिक आहेत. तसेच त्यांना भुतकाळ, वर्तमानकाळ, भविष्यकाळ. या काळाची तीन परिणामे मानली जातात,
१. ते काळ किंवा मृत्युचे मुख किंवा राहू या भक्षक किंवा ग्रास स्वरुपात आहे;
२. ते मृत्युचे मुख आहे ज्याला अहिव्रत (पुरुष) म्हणतात जो स्वतः वैभव, सर्व संपत्ती, ज्ञान आणि देवता धारण करतो; ज्याला हात किंवा पाय नाही, तो सौरऊर्जेचा स्रोत आहे आणि जो विश्वाला व्यापतो आणि ती उर्जा उत्सर्जित करतो असा प्राणी आहे.
३. सिंहाच्या उघड्या तोंडातून श्वास घेणारा तो परमब्रह्म आहे जो जगाला जीवन देणारी उर्जा उत्सर्जित करतो.
महाभारत ( ४७.१७ ) म्हणते की कीर्तिमुखाचे तीन मुख देखील शिवाचे आहेत: काल, पुरुष आणि ब्रह्म.
गरुड :-
हिंदू देवता मंदीरात मुर्तीस्वरुपात दाखवताना नेहमी त्यांच्या वाहनासोबत दाखवल्या जातात. त्यांच्या हातात असलेल्या शस्त्राप्रमाणेच (आयुध, लांछन ), वाहने देखील प्रत्येक देवतेसाठी विशिष्ट असतात आणि ती त्या विशिष्ट देवाचे प्रतीक मानली जातात. भारतीय शिल्पकला शैलीतील, विशेषतः मध्ययुगीन काळातील, वाहने ही मूर्तीचा एक आवश्यक भाग आहेत आणि मूर्तीशास्त्र शिकणाऱ्यांसाठी देवतेला ओळखण्यासाठी एक खुण आहे. अशाप्रकारे, शिवाची मुर्ती सदैव त्याच्या विश्वासू नंदीशिवाय, विष्णू त्याच्या गरुडाशिवाय, स्कंद त्याच्या मोराशिवाय किंवा ब्रह्मा त्याच्या हंसशिवाय कल्पना करणे कठीण आहे. वाहनांसह देवतांच्या सर्वात जुन्या मुर्तीमध्ये, पाचव्या शतकातील एक सुंदर कार्तिकेयाचे शिल्प आहे ज्यामध्ये तो त्याच्या वाहनावर म्हणजे मोरावर बसला आहे, या मोराचा पिसारा पसरलेला आहे आणि त्याने कार्तिकेयाभोवती एक प्रभामंडळ बनवले आहे. सुरुवातीच्या काळात वाहनांनी मुर्तीच्या तुलनेने बरीच जागा व्यापलेली दाखवली आहे, परंतु नंतर त्यांना बाजूला किंवा पायथ्याशी लहान जागांवर खाली दाखवण्यात येते, जे मूर्तीशास्त्राचा विचार केला तर फक्त एक प्रतिक स्वरुपात आहे.महाभारतातल्या एका कथेप्रमाणे गरुड हे कश्यप आणि विनिता यांचे अपत्य आहे. हा जन्मापासूनच अत्यंत तेजस्वी असून, पिंगट डोळ्यांचा आणि सुवर्णमय कंतीचा होता, मोठा भार(गुरुत्मन) वाहणारा म्हणून ह्याला गरुड म्हणतात. महाभारतांप्रमाणें वजनदार वस्तूंना घेऊन उडणारा तो गरुड अशी या शब्दाची व्युत्पत्ती आहे."मृगाणां च मृगेन्द्रोऽहं वैनतेयश्च पक्षिणाम्।"
म्हणजेच प्राण्यांमध्ये मी सिंह आहे तर पक्ष्यांमध्ये मी विनतापुत्र गरुड आहे.गरुडाला पक्षांचा राजा मानलं जात. गरुड म्हणजे भगवान विष्णू यांचं वाहन. शिल्प शास्त्रात वाहन महत्वाची भूमिका बजावतं. काही ठिकाणी फक्त वाहन बघून मूर्तीची ओळख होते उदा. जैन तीर्थंकर सर्व सारखे दिसतात पण त्यांच्या वाहनावरून त्यांची ओळख होऊ शकते.
नागांतक, वैनतेय, विष्णुरथ, सुपर्ण, पक्षिराज, गुरुत्मन अशी काही गरुडाची नाव आपणाला पाहायला मिळतात.


रामायणातील गरुडाची भूमिका
![]() | |
| रावण आणि जटायू युद्ध |
![]() |
| श्रीकृष्ण, सत्यभामा आणि पारिजात घेऊन जाताना गरुड |
त्याची कथा पुढीलप्रमाणे, द्वापारयुगात नरकासुराने उच्छाद मांडला होता. त्याच्या त्रासाला कंटाळून इंद्राने भगवान श्रीकृष्णकडे मदत मागितली. कृष्ण सत्यभामेसह गरुडावर आरूढ होऊन नरकासुराच्या प्रागज्योतिष पुरत गेले, तिथे नरकासुराचा वाढ करून १६ सहस्त्र स्त्रियांची कृष्णाने मुक्तता केली व माता अदितीची कुंडले घेऊन ते स्वर्गात गेले. स्वर्गातील पारिजात वृक्ष सत्यभामेने पहिला ज्याची साल सोन्याची होती आणि त्याला विलक्षण सुगंध होता. बायकोच्या हट्टासाठी श्रीकृष्णांनी पारिजात हा वृक्ष घेतला आणि गरुडाच्या पाठीवर ठेवला. इंद्राने श्रीकृष्णांना विरोध केला पण इंद्र पराभूत झाला आणि पारिजात वृक्ष घेऊन श्रीकृष्ण पृथ्वीवर आले.
विष्णु शिल्प म्हटलं की शेजारी गरुड शिल्प हे समीकरण ठरलेलं आहे. गरुडाच्या शिल्पात देखील खूप वैविधता आढळते. विष्णुच्या यानक प्रकारातील मूर्तीमध्ये भगवान विष्णू गरुडावर बसलेले दाखविले जातात.
इतर ठिकाणी गरुड हा उभा असून अंजली मुद्रेत उभा दिसतो. यातील सर्वात उत्तम उदाहरण बेलूर येथील चन्नकेश्वरा मंदिरात बघता येते.
![]() |
| अंजली मुद्रेतील गरुड, बेलूर |
शिल्प शास्त्रात गरुड शिल्प चार हातांचे बनवावे असं सांगितलं आहे पैकी वरील दोन हातात छत्र व कलश तर इतर दोन हात अंजली मुद्रेत असावेत. गरुडाचा रंग हिरवा असावा, डोळे आणि चेहरा गोलाकार तसेच नाक घुबड पक्ष्या प्रमाणे असावे.
स्कंदगुप्त_क्रमादित्य_सर्का ( ई.स. ४५५-४६७ ) ५ व्या शतकातील गुप्त काळातील नाण्यावर पंज्यामध्ये साप धरलेला गरुड 


कद्रूच्या अंड्यातून साप जन्माला आले पण विनताची अंडी अजून तशीच होती. विनताने एक अर्धपक्व अंड स्वतः फोडलं व त्यातून अर्धपक्व अशा मुलाचा जन्म झाला. तोच हा अरूण. अरुणाने आपल्या आईला श्राप दिला की तू घाईगडबडीत अंडं फोडलं आहे तर तुला तुझा संपूर्ण आयुष्य दासी म्हणून जगावं लागेल. त्यातून तुझी सुटका फक्त तुझा दुसरा पुत्र करू शकेल. ( याच संदर्भात दुसरी कथा अशी आहे कि एक अतिशय सामान्य मुद्दा असलेली पैज ( सूर्याच्या घोड्याचा रंग कोणता ) हरल्यामुळे गरुडाच्या आईला, विनीतेला नागांची आई, कद्रुचे दास्यत्व पत्करावे लागले.)
त्यानंतर विनता बराच काळ कद्रूची दासी बनून होती. पुढे दुसऱ्या अंड्यातून एक पुत्र जन्माला तो म्हणजे गरुड. गरुडाच्या आईला, विनीतेला त्याच्या सावत्र आईने म्हणजे कद्रुने आणि तीच्या मुलांनी म्हणजे नागांनी त्रास दिला होता. या दास्यत्वापासून सुटका हवी असल्यास तर नागांनी गरुडाला अट घातली कि गरुडाने त्यांना अमृत आणुन द्यावे. अमृताची प्राप्ती व्हावी म्हणून गरुड इंद्राची राजधानी स्वर्गाकडे निघाला. वाटेत त्याने सुप्रतिक नावाच्या हत्तीला आणि विभावसु नावाच्या कासवाला अलंबा सरोवरातून पकडले आणि नंतर त्यांना खाउन टाकले. स्वर्गात जाउन तिथल्या रक्षकांना हरवून त्याने अमृत मिळवले. गरुडाने स्वर्गातून अमृत कलश मिळवला पण वाटेत त्याला विष्णु आणि इंद्रदेव भेटले. अमृत कलश सापांना भेटला तर काय होईल याची जाणीव गरुडाला करून दिल्या नंतर तो सकुशल परत आणून देण्याची तयारी गरुडाने दाखवली. इंद्राने त्याला भोजन म्हणून साप खाता येईल असा वर दिला तर विष्णूने त्याला आपले वाहन बनण्याचा वर देऊन त्याला आपल्या ध्वजावर स्थान दिले. हा गरुडध्वज आपण बऱ्याच शिल्पात पाहू शकतो.

कृष्णाच्या रथावरील गरुडध्वज
गरुडाने अमृत कलश आणून नागांना दिला. यामुळे नागांनी विनीतेची सुटका तर केली. त्याने सापांना सांगितले की अमृत प्राशन करण्याआधी अंघोळ करावी. त्याचदरम्यान चलाखी दाखवत इंद्राने तो कलश पळवून आणला आणि स्वर्गात ठेवला. अशा प्रकारे गरुडाने आईला पण सोडवले व अमृत कुंभ पण सापांच्या हाती नाही लागू दिला. त्यामुळे नागांना अमृत प्राशन करता आले नाही. गरुडाने हा अमृतकुंभ टोकदार कुस गवतावर ठेवला होता.अमृत प्राशन करण्यासाठीचा विधी करेपर्यंत इंद्राने अमृतकलश पुन्हा स्वर्गात नेल्यामुळे नागांना अमृत प्राशन करता आले नाही, म्हणून त्यांनी ते कुस गवत खाण्याचा प्रयत्न केला. टोकदार गवतामुळे त्यांची जीभ दुभंगली ती कायमचीच !
अरूण सुर्याचा सारथी झाला तर गरुड विष्णूचे वाहन बनला. सम्पाती आणि जटायू हे याच अरूणची मुलं. सूर्याला स्पर्श करण्याच्या इच्छेने या दोघांनी गगनात भरारी घेतली पण काही क्षणात च जटायू मूर्च्छित होऊन खाली पडला तर सम्पाती सूर्याच्या दिशेने जात राहिला. काही वेळात सूर्याच्या प्रखरतेने सम्पातीचे पंख जळून गेले आणि सम्पाती समुद्र किनारी पडला.



















गणराज रंगी नाचतो, या शांता शेळके यांनी लिहीलेल्या व लता मंगेशकर यांच्या स्वर्गीय आवाजातील या गीतात नारदांच्या बरोबर तुंबरू यांचा उल्लेख येतो. नारद, तुंबरू करीती गायन, करी शारदा वीणावादन.
काही विष्णू मंदिराच्या गर्भगृह(गाभारा) प्रवेशद्वाराच्या भिंतीवर द्वारपाला ऐवजी मंदिराच्या उजव्या हाताला नारद मुनी यांची हातात वीणा व चिपळ्या घेतलेली मूर्ति पहायला मिळते तर डावीकडे हातात वीणा व चिपळ्या घेतलेली, नारद मुनींसारखाच वेष असलेले तुंबरू पहायला मिळतात. भगवंतापुढे सामगायनाची सेवा करणारे हे दोघे.
वैशाख कृष्ण अष्टमीला तुंबरू जयंती असते. माता प्रधा, पिता कश्यप ऋषी तर बाहु, हा हा, हु हु ही तीन भावंडे. (भावंडांची नांवे वैशिष्ट्यपूर्ण आहेत) अत्यंत मधुर गळा, गानकलेतील अद्वितीय अधिकार ही त्यांची वैशिष्ट्ये. रंभा या अप्सरेचे गायनगुरू. धनाधिपती कुबेरांच्या दरबारातील सर्वश्रेष्ठ गायक.
भगवान शंकरांची उपासना करून, घोड्याचे मुख, त्रिखंडात मुक्त संचार करण्याचा अधिकार, गायनकलेतील श्रेष्ठत्व आणि अमरत्व प्राप्त करून घेतले होते.
माहिती संदर्भ:
१) Lost Temples of World,
Face Book Group.
२) श्री.आनंद बापट यांच्या वाॅलवरून
श्री.रोहन विजय उपळेकर,
श्री हरि कीर्तन फेस बुक ग्रुप.
नंदी :-
हिंदू पौराणिक कथांमध्ये नंदी हा सर्वात प्रतिष्ठित आणि पूजनीय वाहन आहे. संस्कृतमध्ये नंदीचा अर्थ "आनंदी " असा होतो. नंदी हा एक वेगळा बैल आहे. तो हिंदू देवता भगवान शिव यांचे वाहन आणि द्वारपाल आहे. नंदीमुळेच सर्व हिंदू गायी आणि बैलांची पूजा करतात. जवळजवळ सर्व शिव मंदिरांमध्ये बसलेल्या बैलाची, नंदीची दगडी शिल्पे आहेत, जी सामान्यतः मुख्य मंदिराकडे तोंड करून असतात. ह्या वृषाची स्थापना शिवलिंगासमोर करतात, त्यामुळे आसेतुहिमाचल शिवाचे मंदिरात सभामंडपात असलेला नंदी हा अवश्य दिसतो.वायु पुराण हे शिवशास्त्रातील साहित्यातील आहे आणि हिंदू धर्माच्या अठरा प्रमुख पुराणांपैकी एक आहे. वायु पुराणानुसार, नंदी हा कश्यप आणि सुरभी यांचा मुलगा आहे. सौर पुराणात, नंदी म्हणजे चार हातांनी सज्ज, त्रिशूळ धारण केलेला, तीन डोळे असलेला आणि हजार सूर्यांच्या तेजाने चमकणारा सोन्याचा दागिने घातलेला बैल आहे. त्याच्या मुगुटांवर चंद्र आहे .
शिवपुराणांत शंकराच्या वृषाची नंदीबैलाची कथा विस्ताराने दिलेली आहे. हा शिलद ऋषींचा मुला शंकराचे वाहन झाला. कूर्मपुराणांप्रमाणे शिलाद ऋषीला भूमी नांगरत असतांना शंकराच्या कृपेने हा मुलगा मिळाला याचे नांव नंदी. ( काहींच्या मते नंदीचा जन्म शिळदांनी केलेल्या 'यज्ञा'तून झाला होता ) त्याचे शरीर हिऱ्यांनी बनवलेल्या कवचांमध्ये होते. नंदी भगवान शिवाचा एक उत्कट भक्त म्हणून वाढला. त्याने भगवान शिवाचा महान भक्त होण्यासाठी कठोर तपश्चर्या केली. अशा प्रकारे त्याला वरदान मिळाले आणि तो भगवान शिवाच्या निवासस्थानाचा द्वारपाल बनला व गणांचे आधिपत्य मिळवले, शंकरानेच मरुताच्या मुलीशी याचा विवाह करून दिला. त्याच्या बायकोचे नांव सुयशा होय.शिवपुराणातील शतरुद्र संहितेत नंदीच्या लग्नाची कहाणी वर्णन केलेली आहे. सुयशाला चंद्रासारखे स्वच्छ छत्र मिळाले होते ज्यावर राक्षसांनी फटक्यांचा मारा केला.
नंदी केवळ द्वारपाल नाही तर जेव्हा भगवान शिव तांडव किंवा वैश्विक निर्मितीसाठी नृत्य सादर करतात तेव्हा संगीत वाजवण्याचे काम करतो. शैव परंपरेनुसार, त्यांना नंदीनात संप्रदायाच्या आठव्या शिष्यांचे - सनक, सनातन, सनंदन, सनतकुमार, तिरुमुलर, व्याग्रपाद, पतंजली आणि शिवयोगी मुनींचे मुख्य गुरु मानले जाते, या आठ शिष्यांना शैवम ज्ञानाचा प्रसार करण्यासाठी आठ दिशांना पाठवण्यात आले होते. योगाच्या दृष्टिकोनातून, नाडी हे भगवान शिवाला समर्पित अंग आहे.
नंदीची प्राचीन दगडी शिल्पकला कंबोडियासह आग्नेय आशियाई देशांमध्ये आढळली आहे. १७ व्या शतकातील म्हैसूरमध्ये आढळणारी सर्वात प्रसिद्ध नंदीची मूर्ती. शिवाय मोहेंजोदारो आणि हडप्पा येथे अनेक बैलांची शिल्पे आढळली. सिंधू संस्कृती देखील भगवान शिव आणि नंदीची पूजा करत असे. गांधारमध्ये कुष्णांनी काढलेल्या पहिल्या-दुसऱ्या शतकातील सोन्याच्या नाण्यांवर नंदी देखील शिवासोबत दिसतो.
दक्षिण भारतीय नंदी वृषाचा बारकाईने अभ्यास केला आहे. त्यांच्या म्हणण्यांप्रमाणे तेथे नंदीचे अंकन खालील तीन प्रकाराने केले जाते :
१) द्राविड मंदिरात अर्धमंडपाच्या तो बहुतेक बाहेर दिसतो, जागा नसलीच तर त्याला आत घेतात.
२) मंदिर शिल्पांत विमानाच्या वरच्या तळावर चारी कोपऱ्यांना शैव मंदिरांचे प्रतीक म्हणून तो दिसतो.
३) महाबलीपुरम् येथील समुद्रतटांवर असलेल्या मंदिरात तो मंदिरांचे आवारावर (प्राकारांवर) अलंकरण म्हणून ओळीने बसविलेला असतो.
उत्तरेपेक्षा दक्षिण भारतातील नंदी प्रतिमा फार भव्य असतात. या प्रतिमांचा तौलनिक दृष्टीने अभ्यास केल्यास असे दिसते कीं पल्लव कलेंत आठव्या शतकाच्या मध्यापर्यंत नंदीला अगदीच नेमके दागिने घालीत, काही शिल्पांत तर ते मुळीच घातलेले नाहीत. सुमारे ८०० ते ९५० च्या दरम्यान गळ्यातील माळा वगैरे आल्या. दहाव्या शतकाच्या मध्यांत त्याच्या गळ्यातील सर्वांत मोठी माळा वाशिंडांला वळसा देत घातली जात असे . सुमारे १०७० च्या जवळ पास गळ्यातील माळांबरोबरच गुडघ्यातील व पायातील दागिने ही आले; अणि बाराव्या शतकांच्या मध्यापर्यंत पोचता पोचता शिवाचा बैल आंगभर दागिन्यांनी नटलेला दिसू लागला." मैसूरच्या चामुंडी पर्वतावरचा जगप्रसिद्ध नंदी तर गळ्यांत शिवलिंगही घालून आहे बसवप्पा किंवा बसवाचार्य या नावाने ओळखला जाणारा शैवाचार्य नंदीचा अवतार समजतात. तिकडे बसव हे वृषाचेच नाव आहे ज्यात ब्रह्मा, सदाशिव व विष्णू या तिघांच्या आद्याक्षराचा समावेश झालेला आहे.
दक्षिणेत मानवरूपांत नंदी शंकरासारखा दिसतो व अधिकार नंदी या नांवाने सपत्नीक शिवमंदिरात असतो." उत्तरेत वृषभाचे तोंड असलेला हा आपल्या पत्नीसह आलिंगन मुद्रेत उभा दिसतो. अष्टभुजा (जिल्हा मिर्जापूर, उत्तर प्रदेश) मंदिरांतून अशा प्रकारच्या बऱ्याच प्रतिमा मिळाल्या आहेत. त्यापैकी काही लखनऊच्या संग्रहालयात तर काही वाराणसीच्या संस्कृत विश्वविद्यालयाच्या संग्रहालयात आहेत.
लेपाक्षी मंदिरात असलेले नागलिंग हे आणखी एक भव्य शिल्प आहे. गर्भगृहाच्या मागे असलेल्या लिंगावर ७ फणी असलेला नाग उभा आहे. स्थानिक समजुतीनुसार नागलिंगाबद्दल एक मनोरंजक गोष्ट आहे. एका तरुण शिल्पकाराला भूक लागली होती आणि त्याने सध्याच्या लिंगाच्या समोर स्वयंपाकघरात काम करणाऱ्या त्याच्या आईला विचारले की जेवण कधी तयार होईल. तिने उत्तर दिले की किमान आणखी एक तास लागेल. वेळ घालवण्यासाठी, शिल्पकाराने हे नागलिंग फक्त एका तासात बांधले. स्वयंपाकघरातून बाहेर पडताना आई आश्चर्यचकित झाली. तिच्या 'दृष्टी'मुळे शिल्पात तीन भेगा पडल्या. म्हणून, या लिंगाची कोणतीही औपचारिक पूजा केली जात नाही. लिंगाच्या कडेला सप्तमातृकांचा शिल्पपट आहे. नागाच्या फणीचे टोक शहराच्या बाहेरील भागात नंदीपासून काही मीटर अंतरावर दिसते. लेपाक्षी नंदी मुख्य मंदिरापासून सुमारे २०० मीटर अंतरावर नंदी आहे.मुळ मंदीराचा सहावा प्राकार मूळतः नंदीपर्यंत पसरलेला होता. आता रस्ते आणि शहरातील घरे (आणि एटीडीसी गेस्ट हाऊस) यांचे मध्ये बांधकाम झालेले आहे. ८ मीटर लांबी आणि ६ मीटर उंचीची ग्रॅनाइट नंदी जगातील सर्वात मोठी नंदी मानला जातो. तंजावरमधील नंदी दुसऱ्या क्रमांकावर आहे.एकाच दगडात घडवलेल्या मुर्तीचा विचार केला तरी तो सर्वात मोठा आहे, गोमटेश्वराच्या मुर्तीनंतर तो दुसऱ्या क्रमांकावर आहे.त्याचे वजन किमान २५० टन असावे. हा नंदी मंदिरातील नागलिंगाकडे तोंड करून उभा आहे आणि अतिशय नैसर्गिक आणि सुंदर स्थितीत दाखवला आहे. त्याची सजावट करण्यासाठी दाखवण्यात आलेल्या माला, कासू मलाई आणि मणि मलाई उत्कृष्ट आणि उल्लेखनीय आहेत.
नाग शिल्प :-
मराठीत नागशीला म्हणून संबोधन केल्या जाणाऱ्या या शिला सारा भारत नागपूजक होता हे सिद्ध करतात. नागाला विषारी दंश असल्याने मानवजातीला त्याची प्रारंभी पासूनच भीती होती. त्याचे हे अस्त्र किती घातक आहे. याची प्रचिती सातत्याने मानवाने घेतलेली असल्याने तो या नागां पासून दूर राहात असे. भीतीतून आकर्षणाचा जन्म झाला. या सर्प योनीची भीती इतकी जबरदस्त होती की, त्यातून तो नागपूजेकडे वळला. पाय किंवा पंख नसताना होणार्या वेगवान, रहस्यमय, तरीही सुंदर हालचाली , त्याचे आकर्षक डोळे, वेगाने अदृश्य होण्याची शक्ती,नागाचे जमीन आणि पाण्यात ही वास्तव्य, कात टाकून द्विजत्व प्राप्त करून घेणे, त्याच्या द्विजिव्हा, हस्त - पाद - पंख विरहित शरीर, आश्चर्यकारक संभोग, अप्रतिम नागफना, त्याचा फुत्कार, त्याची भेदक नजर या सर्वांमुळे नाग मानवजातीत कुतूहल आणि आदराचा विषय बनला व त्यातूनच वेगवेगळ्या समजुती प्रचलित होऊन नागपूजा अस्तित्वात आली असावी आणि अनेक दंतकथा आणि लोककथांचा विषय बनला. प्राण्यांची पूजा करणाऱ्या पंथांमध्ये, जसे की नागांची पूजा करणाऱ्या पंथांमध्ये, त्याच्या अनुयायांमध्ये प्राण्यांच्या जादुई शक्ती, परोपकार, उपचार शक्ती, शहाणपण आणि गुप्त उच्च ज्ञान ताब्यात असल्याचा दृढ विश्वास आढळतो. प्राचीन जगात अरबस्तान, पर्शिया, आशिया, सीरिया, इजिप्त, इटली, ग्रीस, उत्तर आणि पश्चिम युरोपच्या अनेक भागांमध्ये, सध्याच्या लॅटिन अमेरिकन राष्ट्रांमध्ये, चीन, श्रीलंका आणि जपानमध्ये नागांची पूजा लोकप्रिय आणि सार्वत्रिक होती. तथापि, भारतात नागा पंथाला विशेष महत्त्व प्राप्त झाले आणि इतर राष्ट्रांपेक्षा वेगळे, त्याने अनेक विवीध प्रकारांसह अधिक विकसित स्वरूप धारण केले आणि ते अधिक व्यापकपणे विस्तारित झाले. भारत हा असा देश आहे जिथे नेहमीच विविध प्रकारचे साप आढळत होते आणि त्यांच्या विषारी चावण्यामुळे होणाऱ्या मोठ्या संख्येने मृत्यूंवरून हे स्पष्ट होते की प्रागैतिहासिक काळापासून नागांना किंवा नागांना घाबरले जात होते, त्यांचा आदर केला जात होता आणि त्यांची पूजा केली जात होती.

नाग पूजेची सुरुवात सर्वप्रथम इजिप्तमध्ये झाली असे मत सी. एफ. ओल्डहॅम यांनी आपल्या The sun and the Serpent a contribution to the History of Serpent Worship या ग्रंथात मांडले आहे. तर ग्राफिटन एलीएट स्मिथ यांनी, 'Geographical Distribution of the Practice of Mummification.' यात संशोधनपर अभ्यास करताना सूर्य पूजा आणि सर्प पूजा यांचा जन्म ईजिप्तमध्ये झाला असल्याचे सूचित केले आहे. जगात जिथे जिथे या पूजा केल्या जातात. त्या इजिपशीयन प्रभावातून केल्या जातात असेही ते मानतात. परंतु या मताला लायन कॅप यांनी मात्र विरोध दर्शविला आहे. ते Lost continent's the Atlantis the me in History science and literature या ग्रंथात असे म्हणतात, "संस्कृतीचे एकच एक केंद्र असते व तिथून ती संस्कृती जगात प्रसरण पावते असे समजणे योग्य नाही. वास्तविक संस्कृतीचे विशेष जगात अन्यत्र पसरत असतात. म्हणून इजीप्तच्या लोकांना किंवा अन्य कोणत्याही लोकांना अशी श्रेय देणे योग्य होणार नाही."
भारतात सर्वत्र नागपूजा प्रचलित आहे. वेदपूर्व काळापासून भारतात नागपूजा प्रचारात होती. मोहोनजोदाडो येथील उत्खननामध्ये सुद्धा नाग मूर्ती आढळल्या आहेत. नाग विषारी असल्यामुळे मनुष्याला त्याची फार भीती वाटते. ऋग्वेदामध्ये नागाचा उल्लेख 'अहि' या शब्दाने केला असून तेथे त्याची क्रूर, घातकी व भयंकर असे वर्णन केलेली आहेत. नागाची स्तुती करून त्याला वश करून घेतले तर त्यापासून भय राहणार नाही. या कल्पनेने यजुर्वेदात नाग स्तुतीपर मंत्र आढळतात. नागपूजा नागापासून वाटणाऱ्या भयातून सुरू झाली असावी. शतपथ ब्राह्मणात नाग माता कद्रू हिला पृथ्वीचे प्रतीक समजून पूज्य मानले आहे. सर्प वेध या नावाचा अथर्ववेदाचा एक उपवेद आहे. त्यात सर्पाचे विष उतरविण्यासाठी, त्यांना वश करण्यासाठी अनेक मंत्र सांगितले आहेत. करकोटक नागाचे स्मरण करणे हे पापनाशक आहे असे मानले जाते. नागांना संतुष्ट करण्यासाठी सर्पबळी , नागबळी इत्यादी विधी गृह्यसूत्र मध्ये सांगितलेले आहेत. अशाप्रकारे नागापासून आपले संरक्षण व्हावे, या उद्देशाने प्राचीन काळापासून नागपूजा भारतात प्रचारात आली आहे.

जगभरातील सर्वच प्राथमिक धर्मामध्ये व आदिम समाजांमध्ये नागपूजा प्रचलित असल्याचे आढळते. भारतात सर्वत्र नागपूजा प्रचलित आहे. वेदपूर्व काळापासून भारतात नागपूजा प्रचारात होती. मोहोनजोदाडो येथील उत्खननामध्ये सुद्धा नाग मूर्ती आढळल्या आहेत. नाग विषारी असल्यामुळे मनुष्याला त्याची फार भीती वाटते. ऋग्वेदामध्ये नागाचा उल्लेख 'अहि' या शब्दाने केला असून तेथे त्याची क्रूर, घातकी व भयंकर असे वर्णन केलेली आहेत. नागाची स्तुती करून त्याला वश करून घेतले तर त्यापासून भय राहणार नाही. या कल्पनेने यजुर्वेदात नाग स्तुतीपर मंत्र आढळतात. नागपूजा नागापासून वाटणाऱ्या भयातून सुरू झाली असावी.
१) देवता गंधर्व अप्सरा हे सात्विक प्रकारात येतात.
२) यक्ष, किन्नर आणि दैत्य हे राजस प्रकारांमध्ये मोडतात
३) राक्षस, नाग, प्रेत हे तामस प्रकारांमध्ये मानले जातात.
भारतीय साहित्यात नाग हा शब्दप्रयोग देवत्व प्राप्त झालेल्या सापांसाठी वापरला असावा असे वाटते. श्रीमद् भगवद् गीतेतील दहाव्या अध्यायात २८ आणि २९ व्या श्लोका मध्ये सर्प आणि नाग असे वेगवेगळे शब्द आलेले आहेत. काही जण अनेक फणा असलेल्यांना नाग, तर एक फणा असलेला सर्प असे मांनले आहे. महाभारतातील आस्तिक उपाख्याना नुसार हे समानार्थी शब्द असावेत असे वाटते. नाग आणि सर्प यात विषधर आणि विषहीन असाही भेद असावा असे काही जणांचे म्हणणे आहे. नागवंशी हा शब्दप्रयोग त्या राजवंश यांनी केला असावा जे स्वतःचा वंश नाग माता - पित्यापासून निर्मित मानतात. किंवा जे नागपूजेशी संबंधित आहेत त्यांनाही नाग लोक म्हणत असावेत. काहीही असले तरी शेवटी भारतीय राजनेतिक इतिहासात नागांचे महत्त्वपूर्ण योगदान राहिलेले आहे.



पश्चिम बंगालमधील रुबीन म्युझीयम ऑफ आर्ट मधील पाल काळातील १२ व्या शतकातील मनसा देवीची मुर्ती
वेद, महाकाव्ये, सूत्रे आणि इतर अनेक साहित्यासारख्या प्राचीन भारतीय धर्मग्रंथांमध्ये नाग पूजा पंथाचे असंख्य संदर्भ आहेत. ऋग्वेदात नागाची पूजा सुरुवातीच्या टप्प्यात होती तर, यजुर्वेदात ती नियमित उपासना बनली, ज्यामध्ये यज्ञांच्या विविध वस्तू अर्पण केल्या जात होत्या. शतपथ ब्राह्मणात नाग माता कद्रू हिला पृथ्वीचे प्रतीक समजून पूज्य मानले आहे. सर्प वेध या नावाचा अथर्ववेदाचा एक उपवेद आहे. त्यात सर्पाचे विष उतरविण्यासाठी, त्यांना वश करण्यासाठी अनेक मंत्र सांगितले आहेत. ऋग्वेदिक संज्ञा अहि बुध्यान, ज्याचा अर्थ "अखिल सर्प" असा होतो, अथर्ववेद नाग पूजेची अधिक तपशीलवार माहिती देतो आणि सापांविरुद्ध अनेक पुजा आणि मंत्रांनी भरलेला आहे आणि अग्रायण/मार्गशीर्ष महिन्यातील पौर्णिमेच्या दिवशी नाग देवतेची कृपा मिळविण्यासाठीच्या विधीचे देखील वर्णन आहे. अथर्ववेदात अनेक सर्प देवतांची नावे (जसे की असित, राभ्रू, कैरत, पृष्ण, अपोडक, तैमाता, इत्यादी) वेगवेगळ्या संदर्भात उल्लेख आहेत आणि कधीकधी त्यांना गंधर्व, यक्ष (पुण्यजन), अप्सरांसोबत संबध जोडलेला आहे.
गंधर्वपसरसः सर्पांडेवनपुण्यजननपितृण |
असे पाच सर्प देवता तिरश्चिराजी, प्रादकु, स्वजो, कल्मासाग्रीवो आणि स्वित्रो हे दक्षिण, पश्चिम, उत्तर, पूर्व आणि उर्ध्व दिशांचे रक्षक मानले जातात. अथर्ववेदात विशाळाचे वंशज म्हणून वर्णन केलेल्या प्रसिद्ध तक्षकाचा पहिला उल्लेख आहे (तक्षको वैशालेयो). महाकाव्यांमध्ये (महाभारत आणि रामायण) देखील नागांचे विविध प्रकारे संदर्भ आहेत. इरावंतचा पुत्र धृतराष्ट्र हा विराज (ब्रह्मांड) मधील विष (नागांचे निर्वाह) दुध करणारा होता असे म्हटले जाते आणि महाभारतात नागांपैकी सर्वोत्तम म्हणून त्याचा उल्लेख आहे. महाभारतात मणिमत नावाच्या आणखी एका नागाचा उल्लेख आहे, जो सापांच्या फण्यावर रत्ने असतात या श्रद्धेला अधोरेखीत करतो. ही श्रद्धा प्राचीन आहे आणि वराहमिहिर म्हणतात त्याप्रमाणे "तक्षक आणि वासुकी वंशातील साप आणि इच्छेनुसार फिरणारे साप (कामग) यांच्या फण्यावर चमकदार निळ्या रंगाचे मोती असतात" (बृहत्संहिता,)
करकोटक नागाचे स्मरण करणे हे पापनाशक आहे असे मानले जाते. नागांना संतुष्ट करण्यासाठी सर्पबळी , नागबळी इत्यादी विधी गृह्यसूत्र मध्ये सांगितलेले आहेत. अशाप्रकारे नागापासून आपले संरक्षण व्हावे, या उद्देशाने प्राचीन काळापासून नागपूजा भारतात प्रचारात आली आहे. लोक धर्मात नागांचा उल्लेख अर्धमानव रूप आणि इच्छेनुसार कोणतेही रूप धारण करणारा अशी ही तयार झाली. लोकपरंपरेत नाग पूजनाची असलेल्या प्रबळ लोकप्रियते मुळे नाग शिव, बौद्ध आणि जैन तीर्थनकार सारख्या महत्वपूर्ण देवते सोबत संबंध जोडला गेला. ही प्रक्रिया शुंग - कुशान काळापर्यंत पूर्ण झाली होती. सृष्टीच्या संहार कार्याशी संबंधित म्हणूनच शिवाच्या गळ्यात तसेच हातातील भूषणाच्या रूपात नागाला विशिष्ट स्थान प्राप्त झाले. शिवा सोबत असलेला नाग हा काल किंवा मृत्यूचा सूचक म्हणून एक चेतावनीच्या रूपाने पाहता येते. बौद्ध परंपरेत नंद, उपनंद् आणि मुचलिंद या नागांचा उल्लेख येतो. तर जैन परंपरेत सुपार्श्वनाथ आणि पार्श्वनाथ यांचे लांछन नाग आहे. पार्श्वनाथाची यक्ष, यक्षिणी हे सुद्धा नागराज धरणेद्र आणि त्याची राणी पद्मावती यांच्या रूपाने आहेत. मथुरा, भरहुत, सांची आणि अमरावती येथे शुँग, कुषाण, सातवाहनकालीन बौद्ध स्तूपावर नागांचे प्रचुर अंकन मिळते. नागवंशीय शासकांमध्ये आपल्याला छिंदक नागवंशी, फणी नागवंशीय अश्या काही राजघराण्याचे उल्लेख आढळतात.
वैदिक आणि उत्तरवैदिक देवतांमध्ये नागांना खूप महत्त्व होते आणि गृह्य सूत्रांमध्ये सर्पबली नावाच्या विधीचा समावेश आहे, जो पावसाळ्यात चार महिने चालणारा वार्षिक विधी होता आणि विशेषतः दोन कारणांसाठी साजरा केला जात असे: नागांचा सन्मान करणे आणि त्यांच्यापासून सर्व वाईट गोष्टी दूर करणे. अष्टनाग (तक्षक, वासुकी, अनंत/शेष, कर्कोटक, शंखपाल, गुलिका, पद्म आणि महापद्म), आणि मनसा (सापांची देवी, जी आजही पश्चिम बंगाल आणि ओडिशामध्ये खूप लोकप्रिय आहे) यांची पूजा करण्याची परंपरा पावसाळ्यात आणि नागपंचमीच्या दिवशी (श्रावण महिन्यात) सर्पबली विधीचा आधुनिक काळातील एक भाग आहे.

हिंदू धर्माव्यतिरिक्त, बौद्ध, जैन, शीख आणि इतर स्थानिक आणि प्रादेशिक पंथांमध्ये नागांना महत्त्वाचे स्थान मिळाले आहे, जे त्यांच्या धार्मिक स्मारके, शिल्पे, चित्रे, साहित्य, परंपरा आणि लोककथांवरून स्पष्टपणे दिसून येते. बौद्ध ग्रंथ कुल्लवग्गा (श्लोक ६) मध्ये सर्प राजांच्या चार जमातींची नावे आहेत: विरुपाक्ष, एरापथ (एलापात्र), चाब्यपुत्त आणि कान्हागोतमक, ज्यापैकी पहिले दोन अनेक बौद्ध ग्रंथांमध्ये प्रसिद्ध आहेत. बौद्ध ग्रंथांमध्ये मुकालिंद, अपलाल, कालिया इत्यादी नागा प्रमुखांचा देखील उल्लेख आहे जे सर्व वेगवेगळ्या संदर्भात बुद्धांना आदर देतात. त्याचप्रमाणे मथुरेत नागा कालियावर कृष्णाचा विजय, अधिक प्राचीन नागा पंथावर कृष्ण पंथाच्या (वैष्णव धर्म) वर्चस्वाबद्दल बोलतो.

विशेष म्हणजे, भारतातील ब्रिटिश सरकारने तयार केलेल्या १८९१ च्या जनगणनेच्या अहवालात देशाच्या विविध भागांमध्ये सर्पपूजकांच्या प्रभावाचा आणि संख्येचा तपशीलवार उल्लेख आहे. त्या वेळी "आग्रा आणि अवध या संयुक्त प्रांतांमध्ये नागाचे ३५,३५६ आणि सर्प नायक गुगा पीरचे १२,२९९१ उपासक होते, तर पंजाबमध्ये ३५,३४४ उपासक गुगाची पूजा करत होते,"१ जेम्स फर्ग्युसन यांनी त्यांच्या "ट्री अँड सर्पेंट वॉर्पिशप" या पुस्तकात मणिपूर आणि संबलपूर (ओरिसा) मध्ये जिवंत सापांच्या पूजेबद्दल लिहिले आहे. कालिकत येथील एका सर्प मंदिरात पुजारी आणि उपासकांकडून अनेक जिवंत नाग ठेवले जात होते ज्यांची काळजी घेतली जात होती. सापांचे काळजीपूर्वक संरक्षण केले जात होते . पूर्वजांच्या आत्म्यांचे प्रतिनिधित्व करणारे म्हणून त्यांची पूजा केली जात होती.
आता नागपंचमीच I
नाग आल्याची खेळायला |
मी ग भैय्याला सांगयितु
बारा सणाला नेऊ नको |
पंचमीला र ठेवू नको |
तर
पंचमीचा सण आला डोळे माझे ओले
बांधिले ग सख्यांनी झाडाला हिंदोळे ( तारा भवाळकर, लोक संचित )
हे सारे नाग पंचमीचे महत्व अधोरेखित करतात.
ऋग्वेद, यजुर्वेद, अथर्ववेद, गृह्यसूत्र, रामायण, महाभारत, मैत्रेयी सहिता आणि पुराणात नागांचे अनेक उल्लेख आढळतात. ते ही वेगवेगळ्या समानार्थी शब्दाने. नाग पूजेच्या संदर्भाने भारतीय साहित्यात विविध विधी सांगितलेल्या आहेत. अथर्ववेदात नागाला चारी दिशांचा दिक्पाल म्हटलेले आहे. ललितविस्तार या बौद्ध ग्रंथात नागाला लोकपाल रुपात मान्यता दिलेली दिसते. नागराजा तक्षकाने स्वेच्छेने राजा परिक्षितला दंश केला नव्हता. तर ऋषीच्या शापाला पूर्ण करण्यासाठी तो दंश होता. असे नारदाने परीक्षित पुत्र जनमेंजय यास सांगून सर्पसत्र किंवा नागयज्ञ बंद करावयास लावला. त्यावेळी राजा जन्मेजय याने प्रायश्चित करण्याची तयारी दर्शविली. तेव्हा नारद मुनी ने सांगितले की, " सामूहिक रुपाने तुझ्या प्रजेने प्रतिवर्ष नागांची पूजा करावयास हवी. " असे म्हणतात की तेव्हापासून नागपंचमीला सुरुवात झाली. नाग संबंधी अनेक मिथके आपल्याला पाहावयास मिळतात. पंचतंत्राच्या कथित नागा संबंधी भरपूर लिखाण आढळून येते. नल दमयंती कथेत ही नल राजाने नागाची केलेली प्राण रक्षा आणि त्यातून नागाने केलेले सहकार्य वाचावयास मिळते.
नाग किंवा साप यांना लैंगिक भावनेचे प्रतीक मानण्यात येते. ज्यावेळी एखादा साप खांबाला वेढा देऊन बसतो तेव्हा तो खांब प्रेरित झालेले लिंग वाटतो. साप हा पुरुषवाचक शब्द म्हणून वापरला जातो. या सरपटणाऱ्या प्राण्यात लिंगाची रचना असल्यामुळे ते वासनेचे प्रतीक आहे. त्यासाठी त्याला वैशेयिक मन, संभोग इच्छा आणि संभोग इच्छा कमी होणे इत्यादीचे प्रतिनिधित्व सरपटणारे प्राणी करतात. ज्या वेळी स्त्री व पुरुष उत्तम परिस्थितीत व तंदुरुस्त शरीराने एकमेकांकडे आकर्षित होतात. त्यावेळी त्यांच्या लिंगाची व योनीची स्थिती एखाद्या वळवळणाऱ्या प्राण्या सारखी होते. ग्रीक कथेत एडम व इव्हा यांच्याजवळ साप हे प्रतीक यामुळेच दाखवण्यात येते. प्रसिद्ध मनोवैज्ञानिक सिगमंड फ्रॉइड याने सुद्धा नागाला काम प्रतीक मानले आहे. त्यांच्या मतानुसार, आदिम समाजातील स्त्रिया नागाची पूजा काम प्रतिकाच्या रूपानेच करत असत. कदाचित यामुळेच जगभरात आणि विशेषतः भारतामध्ये नागपूजा या स्त्रियाच करतात. नागाची पुत्रप्राप्तीसाठी आराधना करणे किंवा शिवा सारखा श्रेष्ठ पती मिळावा यासाठी शिवपूजन करणे या पाठीमागे ही कामभावना प्रेरित असावी असेही मानले जाते. वांझ स्त्रिया पुत्र प्राप्ती साठी नागशिळेची पूजा करतात. नागाच्या काम रूपा संदर्भाने कश्मीरी लोक कथेनुसार, सुरिनसर किंवा सुनासर ही झील अध्यात्मिक बाबतीत पवित्र मानली जाते. हा संदर्भ महाभारत काळाशी जोडला जातो. वनवासात असतांना पांडव जम्मू येथे गेले होते. ज्यावेळी नागकन्या उलुपी सोबत अर्जुनाचा विवाह झाला होता. तसेच माणिपूर राज्याची राजकन्या चित्रगंधा हिच्यासह ही अर्जुनाने विवाह केला होता. कालांतराने त्यांना बब्रुवाहन नामक वीर पुत्र जन्माला आला. अर्जुनाचे वास्तव्य तिथे अल्पकाळ असल्याने पुत्र जन्माची वार्ता अर्जुना पर्यंत पोहोचली नाही. महाभारताच्या युद्धसमाप्तीनंतर पांडवांनी अश्वमेध यज्ञ केला होता. यज्ञाचा अश्व बब्रुवाहन यांनी रोखून धरला होता. तो सोडविण्याचा प्रयत्न अर्जुनाने केला असता. युद्ध कौशल्यात अर्जुन कमी पडला. त्यामुळे अर्जुनाला मूर्च्छा आली. ही वार्ता चित्रगंधा हिला कळाली असता ती रणभूमीवर आली आणि पुत्र बब्रुवाहन यावर ती क्रोधित झाली. वडिलाला जिवंत करण्यासाठी बब्रुवाहन यांनी वैद्यची मदत घेतली. वैद्यांनी उपचार सांगितला की, पाताळ लोकातून नागमणी (वनौषधी) आणावी लागेल. त्यासाठी बब्रुवाहन याने पाताळ लोकात बाण मारला. त्या बाणाने इच्छित नागमणी आणला. त्या साठी नागकन्या उलुपीने साह्य केले. त्या नागमणीच्या सह्याने अर्जुन जागा झाला. ज्या मार्गाने बाण गेला आणि ज्या मार्गाने बाण परत आला तिथे दोन्ही बाजूने झील तयार झाली असे मानले जाते. तेव्हा पासून नवविवाहिता या झीलची तीन वेळा परीक्रमा करून नाग देवतेचा आशीर्वाद घेऊन वैवाहिक जीवनाला प्रारंभ करते.

नागाचे संतान दायी सामर्थ्य भारतीय जनमानसातील अनेक धारणांमधून व्यक्त होत असते. दक्षिणेतील सर्व प्रमुख क्षेत्रपाल देव आपले नागरूपात्व सांभाळून आहेत. ग्रामीण भागातून आजही अशी दृढ समजूत आहे की, एखाद्या गर्भवती स्त्रीने साप पाहिला असता, त्याचे तत्क्षणी डोळे जातात आणि ती स्त्री प्रसूत झाल्यावर तिच्या नान्ही घराचा गंध अनुभवल्यावर तो नाग पुन्हा डोळस होतो. ती गरोदर असताना त्या स्त्रीचा आणि पुरुषाचा संबंध येऊ नये किंवा समागम घडू नये, असा निषेध त्यात अभिप्रेत असावा. सर्व पुरुष नागाचे प्रतिनिधी आहेत आणि नाग हे पुरुषी तत्त्वाचे प्रतीक आहे. म्हणून वारुळाची पूजा भूमीच्या सृजनेंद्रीयचे प्रतीक म्हणून केली जाते. वारूळास पृथ्वीची योनी म्हणतात. योनी रूपिनी भुदेवी आहे. योनी प्रतीक म्हणून नैसर्गिक वारूळची उपासना अति प्राचीन काळापासून आजपर्यंत दक्षिण भारतात तरी अखंड प्रचलित आहे. वारूळ ही फारच नाजूक असल्यामुळे वारूळ सादृश्य घडीव शीला मूर्तीचे प्रचलन क्वचित कोठे असल्याचा पुरावा उपलब्ध आहे. वारुळाच्या शीला रूप प्रतिकृती नंतर नाभी पर्यंतच्या योनी मूर्ती घडविल्या जाऊ लागल्या. तसेच प्रसवा बरोबरच पोषणाचा ही मातृत्वाशी संबंध असल्यामुळे योनि प्रमाणेच स्थानांना उठाव देणाऱ्या स्कंदा पर्यंतच्या मूर्तीची निर्मिती होत गेली. भू देवीच्या सर्जक आणि पोषक इंद्रियांच्या मूर्तीचा हा वारूळ ते योनी - स्तन - युक्त मूर्ती पर्यंतचा क्रमविकास श्री रा. चि. ढेरे यांनी सिद्ध केला आहे.
कल्याणमल्ल, कोक्कोक, दीक्षित श्यामराज, श्री प्रोढदेवराज, मथुरा प्रसाद दीक्षित यांनी नायिकेच्या माणस प्रकृतीचा ही उल्लेख केलेला आहे. देव सत्वा, यक्ष सत्वा, मनुष्य सत्वा, पिशाच्च सत्वा, नाग सत्वा, काक सत्वा, वानर सत्वा आणि खर सत्वा असे प्रकार सांगण्यात आलेले आहेत. सत्व या शब्दाचा अर्थ शील असा होतो. अर्थात नायिकेच्या चारित्र्य आणि वागणुकीवरून हे सत्वाचे प्रकार दिलेले आहेत. त्यानुसार जी नेहमी एखादी घटना किंवा काम विसरते, विसराळू स्वभावाची जी नेहमी व्याकुल, घाबरलेली असते, सापाप्रमाणे दीर्घ श्वास घेणारी, नेहमी निद्राधीन राहणारी, नेहमी जांभळी देणारी ती नाग सत्वा जाणावी. असे म्हंटले आहे.
वरील विवेचनावरून असे म्हणता येईल की,
१) सर्वच प्राचीन मानवी सभ्यतेत नागा विषयी भीतीतून आदरभाव निर्माण झाला.
२ ) नाग सादृश्यधिष्टीत कल्पनेच्या जोरावर सूर्या सोबत संबंध जोडून कथा निर्मिती केल्या गेल्या.
३ ) नाग हे अत्यंत जहाल विष बाळगून असल्यामुळे आमचाही वंश नागसम आहे. हे दाखविण्यासाठी कुळवंश प्रतिकाच्या रूपाने नाग हे 'कुलचिन्ह' म्हणून ज्या जमातींनी किंवा राज वंशानी स्वीकारले त्यास नागलोक या नावाने ओळखण्यात येते.
४ ) नागाची शरीर रचना ही पुरुष लिंगाप्रमाणे असल्यामुळे आणि वारूळ स्त्री लिंग अथवा भूमिचे / सृजनाचे प्रतीक म्हणून स्वीकारले गेले असावे.
५ ) दक्षिणेतील अनेक क्षेत्रपाल देवता आपले नागरूप प्रकट करताना दिसतात.
६ ) आशीर्वाद देत असताना हाताची मुद्रा ही पाच फडा असलेल्या शेषनागाची मुद्रा मानली जाते. यज्ञोपवीतातील एका सूत्राचे नाव नाग तंतू असे आहे.

भारताचे अतिशय प्राचीन नगर जे वायव्य सीमेवर भारताच्या प्रवेशद्वारावर वसलेले नगर म्हणजे तक्षशिला होय. जगातील विद्या अभ्यासाचं प्राचीनतम केंद्र, भारतीय लोक परंपरेनुसार ही नागराजा तक्षकाची नगरी. उत्तर प्रदेशातील अहिच्छत्र नगरी ही परंपरेने नागांची जोडल्या जाते. तिचे नावच अही म्हणजे नाग. हा तिचा नागाची संबंध सांगणारे आहे. मध्य प्रदेशात गोलियर जवळ हे शहर होते. प्राचीन पद्मावती नगरी ही पुराण प्रसिद्ध नगर. पुराणात येथील नागवंशी राज्यांची विस्तृत वर्णने आहेत. येथील नागसेन नामक राजाचा उल्लेख सम्राट हर्षवर्धन याचा राजकवी बाणभट्ट याने आपल्या हर्षचरित्रात केला आहे. नागद, नागपूर, नागापूर, नागग्राम, नागठाणा, नाग हल्ली, नागुर, नागझरी अशी नाग नामक गावे भारतात सर्व प्रांतात आहेत. हल्लीचे पद्म पवया हे ग्वालियर जवळ आहे. पूर्वी पद्मावती या नावाने प्रसिद्ध होते. येथे वृषनाग, भीम नाग, स्कंद नाग, वसू नाग, व्याग्र नाग आदी राजांची नाणी सापडली आहेत.
भारतातील एक प्राचीन वंश. भारतात नाग राजे फार प्राचीन काळापासून राज्य करीत असावेत पण त्यांचे फार थोडे उल्लेख आढळतात. अगदी प्राचीन काळापासून नागवंश अस्तित्वात आहे. त्यांची राज्ये लहान व विखुरलेली होती, पण ती प्रत्येक कालखंडात होती. नागवंश (Naga dynasty) भारताच्या प्रदीर्घ इतिहासाचा महत्त्वाचा साक्षीदार आहे. नागांचे पुसटसे उल्लेख वेदांमध्ये आढळतात;
शेष - अनंत या नावानेही शेष नागाचा ओळखले जाते. शेषनागाने गंधमादन पर्वतावर तपस्या केल्यानंतर ब्रह्माजीच्या वरदानाने पृथ्वीचा भार सांभाळण्याचे काम त्याच्याकडे सोपविण्यात आले. हरिवंश पुराणानुसार ब्रह्मदेवाने वासुकीला नागांचा राजा, तक्षकाला सापांचा राजा आणि शेषाला सर्वच विषदंती प्राण्यांचा राजा बनविला. यावरून शेषनागाचे महत्त्व सिद्ध होते. धार्मिक ग्रंथानुसार लक्ष्मण आणि बलराम शेषनागाचे अवतार रूप आहेत. हाच शेषनाग विष्णू चा सेवक म्हणून क्षीरसागरा मध्ये आहे. विष्णू विश्राम मुद्रेत शेष नागच्या वेटोळ्यावर झोपलेले असतात. श्रीकृष्ण जन्म समयी वासुदेव कृष्णाला यमुना पार करत असताना प्रचंड वर्षा होत होती. त्यावेळी शेषनागाने आपला फणा कृष्णा वर धरून यमुना पार करण्यास मदत केली होती.
वासुकी - हा समस्त नागांचा राजा. वासुकी हा शिवाच्या कंठास लपेटलेला असतो असेही म्हणतात. समुद्रमंथनाच्या वेळी दोरीच्या रूपाने वासुकीचा उपयोग केला गेला होता. शिवाच्या त्रिपुरांतक अवतारात शिवाने एकाच बाणात असुरांची तीन पुरे नष्ट केली होती. त्यावेळी धनुष्यबाणाची प्रत्येंचा वासुकी बनला होता. कथासरित्सागर या ग्रंथानुसार लता देशाचा राजा वासुकीच्या संबंधाने आदर भाव प्रकट करण्यासाठी प्रति वर्ष उत्सव करीत असे.
तक्षक - शृंगी ऋषीच्या शापाची अंमलबजावणी करण्यासाठी तक्षक नागाने राजा परीक्षिताला डसले होते. त्यामुळे तक्षकाचा बदला घेण्यासाठी परीक्षित पुत्र जनमेंजयने सर्प यज्ञ केला होता. तेव्हा सर्व साप यज्ञात येऊन पडू लागले. त्यावेळी आस्तिक मुनीने तक्षकाची रक्षा केली. तक्षकच शिवाच्या गळ्यात असलेला नाग आहे असे ही मानले जाते. तक्षकाचा पुत्र अश्वसेन पाताळात राहत असे. खांडव वन अग्निकांड पासून तो अर्जुनाचा विरोधी होता. त्यामुळे कुरुक्षेत्र रणभूमीवर अश्वसेन कौरवांच्या बाजूने सामील झाला होता. अथर्व वेदा नुसार तक्षक हा सर्वाधिक विष असलेला नाग होता असे म्हटले आहे. कौशिक सूत्रानुसार गृहरक्षे साठी तक्षका समोर बळी द्यावा असे म्हटले आहे. असे म्हटले जाते की, तक्षशिला येथे तक्षक संप्रदायाचा प्रभाव होता. मध्यप्रदेशात तक्षकेश्वर या नावाने इंदोर जवळ नवाली गावात एक मंदिर आहे.
करकोटक - यास शिवाचा गण असेही म्हणतात. हरिवंश पुराणात या नागाचा विशेष उल्लेख मिळतो. नल-दमयंती कथेतही करकोटक येतो. आपल्या आईच्या शापातून मुक्त होण्यासाठी महाकाल वनात शिवलिंगाची पूजा केली होती. राजा परीक्षिताचा मुलगा जनमेजयने नागयज्ञ करून सर्व सर्पांचा वध केला.ज्यामध्ये वासुकी, तक्षक आणि कर्कोटक हे साप वाचले होते. इंद्राने वासुकी आणि तक्षकांचा बचाव केला, तर कर्कोटक उज्जैनमधील महाकालच्या आश्रयामध्ये राहून जिवंत राहिले.
कालिया - याचा निवास आपल्या कुटुंबासह यमुना नदी मध्ये होता. त्यामुळे यमुने मध्ये विष पसरले होते. कृष्णाने कालियाला युद्ध करून यमुना सोडण्यास भाग पाडले.
खांडववनात जेव्हा आग पेटली होती तेव्हा अश्वसेन नावाचा नाग वाचून गेला होता ज्याला अर्जुनाशी बदला घ्यायचा होता.
चित्रस्रोत: गुगल- अश्वसेन - अर्जुन युद्ध.
चित्रस्रोत: गुगल -पद्मनाग
नवनागस्तोत्र :
शंखपालं धृतराष्ट्रं तक्षकं कालियं तथा॥
एतानि नवनामानि नागानां च महात्मनाम्।
सायंकाले पठेन्नित्यं प्रात:काले विशेषत:।
तस्य विषभयं नास्ति सर्वत्र विजयी भवेत्॥
॥ इति श्री नवनागस्तोत्रं संपूर्ण ॥
नागशिल्प –
संपूर्ण भारतात तुम्ही कुठे ही गेलात तर तुम्हाला नागशिल्प बघायला मिळतात आणि आज त्याच नागशिल्पांना आपण प्रत्येक नागपंचमीच्या सणाला पुजतो. गावोगावी दिसणाऱ्या ह्या नागशिल्पांचा नेमका अर्थ आपल्याला प्राचीन भारताच्या इतिहासातून मिळतो. भारताचे नैसर्गिक स्थान , समृद्धता ह्यामुळे भारतावर कायमच आक्रमण होत राहिले. उत्तरेकडून होणारी आक्रमणं मोठ्या प्रमाणावर होती. सिंध प्रांत, खैबर खिंड इथून आक्रमणांचे येणारे लोंढे नागराजांकडून रोखले जायचे.राज्यक्षेत्र जरी वेगवेगळी असली तरीही कोणावर ही परकीय शत्रू चालून आल्यास एकीचे बळ दाखवत शत्रूस तोंड देण्याचे काम ह्या राजांनी केले आणि आपले साम्राज्य अबाधीत ठेवले. कालांतराने पंचक्रोशीत शूर राजे असे नाव कमवून नागराजांनी जनतेच्या मनात खास अशी जागा निर्माण केली. ‘नाग’ हा वंश म्हणून ओळखला जाऊ लागला आणि संपूर्ण भारतभर नाग वंशाचा प्रचार होऊ लागला. नाग लोक जेव्हा आपल्या धर्मप्रचारासाठी संपूर्ण भारतभर भ्रमण करत होते तेव्हा त्यांनी आपल्या राजांची आठवण म्हणून मोठ्या मोठ्या शिळांवर
पाच राजांची प्रतिमा कोरली. कालांतराने बदल होत गेले पाच नागराजांचे प्रतीक असलेले नागशिल्प तीन , दोन आणि एक अश्या स्वरूपात कोरण्यात येऊ लागले. मध्ययुगीन काळात ह्याच नागशिल्पाचा वापर मंदिरांवर सुद्धा करण्यात आला. चपळता दर्शवण्यासाठी प्रतिकात्मक शिल्प म्हणून वापर करण्यात आला. ह्यात काळानुसार अनेक बदल होत गेले आणि नागपंचमी ह्या सणाला हीच नागशिल्प जी कधीकाळी नागराजांची आठवण होती नागपंचमीच्या सणाला पुजली जाऊ लागली.
भारतीय कलेने भावना प्रकट करण्यासाठी प्रतीकांना जन्म दिला. जसे नाग कश्यप आणि कद्रू यांचे पुत्र असल्याचे पुराणात उल्लेख आहेत. पौराणिक नाग लोकांमधील अनंत, वासुकी, शेष हे नाग मानवा अनुकूल होते. तर तक्षक, कारकोटक, कालिया हे मानव वैरी होते. नाग हा वारूळात राहतो आणि वारूळ हे भू देवतेचे प्रतीक मानले आहे. त्यामुळे भूमीच्या सृजन शक्तीशी त्याचा संबंध जोडला गेला. शिव आणि विष्णु या दोघांचाही नागाशी संबंध आहे. नागफणी धारण करणारी कालिकादेवी आहे. त्याचप्रमाणे गणेशाच्या पोटावर ही नागबंध आवळलेला असतो. कंसाच्या कैदेतून बाहेर पडल्यानंतर पावसापासून रक्षण करण्यासाठी वासुकी नागाने कृष्णावर फना छत्र धरलेले होते. बुद्धांच्या जन्मानंतर नंद व उपनंद या नागांनी स्नान घातले होते. तर ज्ञान प्राप्ती नंतर मुचलिंग नागाने त्यांच्यावर आपला संरक्षक असे फनाछत्र धरले होते. जैन तीर्थंकर पार्श्वनाथ यांचे नाग हेच अभिज्ञान चिन्ह आहे. कामठा किंवा मेघमालि हा पूर्वजन्मीचा पार्श्वनाथाचा भाऊ जो वैरी बनला होता. त्याच्या हल्ल्यापासून यक्ष धरणेद्र हा आपल्या सात फण्याचे छत्र पार्श्वनाथच्या डोक्यावर धरले असल्याचे शिल्प वेरूळ लेणीत आहे.
श्रवणबेलगोळ येथील गोमटेश्वराच्या प्रचंड मूर्ती भोवती अनेक वारुळे निर्मिले असून त्यातून नाग बाहेर येत आहेत असे शिल्पात दाखवले आहे. नाग हे योगाचे ही प्रतिक मानले जाते. त्या कारणाने शिवाची योगी राजत्व दाखविण्यासाठी नाग शिवा जवळ सातत्याने दाखविला जातो. अशी ही पौराणिक मान्यता आहे.
शिल्प शास्त्रातील नागाचे महत्व :
हिंदुधर्मात भुतदयेवर भर दिलेला दिसतो. इथ सर्व प्राण्यांना योग्य ती वागणूक दिली आहे. गावागावात आपणाला नागाचे शिल्प दिसून येते. मंदिराचा आवार असो किंवा गावातील पार एखादे तरी नागशिल्प असतेच. महादेवाने नागाला आभूषण म्हणून धारण केले आहे तर विष्णूने त्याची शय्या बनवली आहे तसेच गणपतीने नागाला पोटाभोवती गुंडाळले आहे. देवतांच्या विविध मूर्तीमध्ये नाग दिसतो. मंदिरावर शक्यतो तीन, पाच किंवा सात फण्यांचा नाग दिसतो. नाग जोडी असेल तर त्याला नागमाता म्हणतात. मंदिर बांधकामात भैरवयंत्र, योगिनीयंत्र, नागबंध असे काही शास्त्र वापरले जातात. मंदिर बांधकामांसाठी कोणता काळ योग्य आहे हे ठरवण्यासाठी देखील नागाचा वापर होतो.
मंदिर बांधकामांसाठी कोणता काळ योग्य आहे हे ठरवण्यासाठी देखील नागाचा वापर होतो. बांधकामाचा पाया खणण्यासाठी खालील संकेत देण्यात आला आहे
नागवास्तुं समालोक्य कुर्यात् खातविधिं सुधीः ।
पाषाणान्तं जलान्तं वा ततः कूर्म निवेशयेत् ॥
नागवास्तुची स्थिती बघून त्याप्रमाणे शहाण्याने पाया खणण्यास सुरूवात करावी. पाया मजबूत पाषाणापर्यंत किंवा भूगर्भान्तर्गत पाण्याच्या पातळी पर्यंत खोल खणावा व तेथे कूर्माची स्थापना करावी.

भाद्रपद, अश्विन व कार्तिक महिन्यांत नागाचे डोके पूर्व दिशेकडे असते. या तिमाहीच्या पहिल्या दिवशी नागाचे डोके बरोबर ईशान्य दिशेकडे असते व शेवटच्या दिवशी ते आग्नेय दिशेकडे असते. अशा रीतीने नागाचे डोके एका दिवसाला एक अंश असे प्रदक्षिणा क्रमाने फिरते.

शिल्पप्रकाश नुसार पूर्व दिशेकडील तोरण सर्वसाधारणपणे यश देणारे असते. वास्तुची पूजा इत्यादी श्रावण तसेच भाद्रपदात करू नये. मार्गशीर्ष व पौष महिन्यात नागाचे डोके दक्षिणेकडे असते. हा शाखाच्या मताने यथायोग्य शुभ काल असतो. त्यावेळी नागबन्धाला अनुसरून शंकूची स्थापना करणे उत्तम असते. त्यानंतर प्रासादाच्या समितीची स्थापना करण्यासाठी (पायासाठी) खड्डा खोदावा.
नाग आपल्या शरीराने मध्यबिंदूपाशी २७० अंशांत फिरलेला असतो व ९० अंशांचा भाग सोडून दिलेला असतो. शिल्पसारणींत या नागाला गृह-नाग म्हटले आहे, कारण देवालयाच्या दरवाजाची दिशा त्याच्या (मुखाच्या) स्थानावरून निश्चित केली जाते. देवालय त्याच्या छातीपाशी असून देवालयाची लांबी त्याच्या शेपटीच्या दिशेकडे असते, त्याचे डोके ज्या दिशेला असेल त्या दिशेला दरवाजा ठेवतात. या सापास काल-सर्प देखील म्हणतात. त्यास ३६० हाडे (दिवस व रात्री), ६ अवयव (ऋतू), १२ वळसे (महिने) असतात.त्याच्या शरीराचा वरचा गडद रंगाचा भाग रात्र व खालचा फिक्या रंगाचा भाग दिवस दर्शवितात. अशा रीतीने एक वर्षाचा कालावधी या नागाने दर्शविला जातो.
१ ) पहिल्या स्वरूपात सर्प अनेक डोके असलेला आहे.
२ ) दुसऱ्या प्रकारात, तो बहुमुखी सर्पाच्या फणीसह मानवी स्वरूपात दाखवला आहे.
३ ) तिसरा प्रकार दोन्ही एकत्र करतो, जिथे वरचा भाग मानवी शरीराचा आहे तर खालचा अर्धा भाग गुंडाळलेल्या सापाचा आहे.
हडप्पा संस्कृतीतील उत्खननातून मिळालेल्या माहितीवरून हे स्पष्ट होते की, नाग लोक भारतीय धार्मिक परिस्थितीत सुरुवातीच्या काळात दिसतात. त्यापैकी मोहेंजोदारोमधील दोन ठसे आहेत ज्यात योगासनात बसलेल्या देवतेचे चित्रण आहे, ज्यामध्ये दोन्ही बाजूला दोन गुडघे टेकलेल्या आकृत्या आहेत आणि प्रत्येक आकृतीच्या मागे एक सापाचे डोके उंचावलेले आहे ज्यावर पसरलेला फणा आहे. याशिवाय, हडप्पाकालीन मातीच्या भांड्यांवर साप रंगवलेले आढळले आहेत आणि एक मातीचा कंठा सापडला आहे ज्यावर एका आसनाच्या खालच्या बाजुला एक सापाची आकृती दिसते.
आयुध रूपातील नाग प्रतीक :-
बहुतांश देवतेसमोर नाग हे चिन्ह आयुध म्हणून दाखवण्यात येत असले तरी, प्रत्यक्षात शिवा सोबत सर्प / नाग हे लांछान कायमस्वरूपी जोडले गेलेले आहे. प्रतिमा लाक्षणिक विवरण पाहता विष्णुधर्मोत्तर पुराण, मत्स्यपुराण, मानसार, मयमत, कामिकागम, अंशुमतभेदागम, देवता मूर्ती प्रकरण, आदी शिल्प शास्त्रीय ग्रंथात शिवाच्या आयुधात कृष्णमृग, खडग, खेटक, वज्र, परशु, त्रिशूल, खट्वांग, डमरू, पाश, हस्ती चर्म, दंड, कपाल, अक्षमाला, धनुष्य, शंख, चक्र, गदा आणि सर्प किंवा नाग सांगितला आहे.
ऐतिहासिक काळातील नागांच्या काही सुरुवातीच्या प्रतिमा भरहुत कठड्यावर (इ.स.पूर्व दुसऱ्या शतक ) एलापत्र आणि चक्रवाक यांच्या आहेत. दोन्ही पूर्ण मानव आहेत ज्यांच्या वर पाच फणा असलेले सापाचे डोके आहेत आणि अंजली ( नमस्कार करण्याच्या ) मुद्रेत बुद्धांना नमस्कार करताना दाखविले आहेत.
मथुरा परिसरातून कुशाण काळातील सापडलेल्या नाग प्रतिमा त्यांच्या भक्तांनी स्थापन केलेल्या असून नाग पंथाचा प्रभाव दर्शवितात. मथुरेजवळील चारगाव येथे सापडलेली एक नाग प्रतिमा ही एक सामान्य मुर्ती आहे ज्यामध्ये ७ फण्या आणि समोर दोन्ही बाजूंना सर्पाचे वेढे दिसतात. येथे नाग देवतेचे द्वैत स्वरूप म्हणजे बहुमुखी साप व उभ्या असलेल्या मानवाचे एकत्रित शिल्प दाखवले आहे. हे रूप आपण बलरामाचे पाहतो त्यासारखेच आहे. खरं तर अशा नाग मूर्तींना अजूनही गावांमध्ये पूजा केली जाते, परंतु त्यांना वेगवेगळ्या नावांनी जसे दौजी (मोठा भाऊ) किंवा बलदेव (बलराम) असे संबोधले जाते. कुशाण साम्राज्याच्या पतनानंतर नाग पूजा पंथ उत्तर आणि मध्य भारतात आणि आसपास पसरला जिथे त्यांना इतर सत्तांचा राजाश्रय मिळाला.नाग पूजेबद्दल तक्षशिला, पद्मावती, विदिशा, मथुरा, कांतिपुरा आणि अयोध्या येथे असंख्य शिलालेख, अंकशास्त्रीय आणि साहित्यिक पुरावे सापडले आहेत त्यावरुन या वस्तुस्थितीद्वारे पुष्टी मिळते कि येथे मोठ्या प्रमाणात नागपुजा होत होती.
विरसेन नावाच्या एका शासकाच्या (त्याची राजधानी मथुरा येथे होती) काही उपलब्ध नाण्यांवरून, सिंहासनावर एक सर्प उभा असल्याचे दिसून येते, ज्यावर एक स्त्री आकृती बसलेली आहे (ही देवी गंगा असू शकते) तिच्या उजव्या हातात कलश धरून आहे. कुमुदासेन, धनदेव आणि विशाखदेव (इ.स.पू. १५० ते १०० दरम्यान अयोध्येचे राजे) या तीन राजांच्या नाण्यांवर सापांचे प्रतीक म्हणून चित्रण केले आहे.



चारगाव येथील दुसर्या शरकातील कुषाण सम्राट हुविष्क सिर्का सेनाहस्ती-भानुका यांच्या चाळीस वर्षाच्या काळातील उभी ( स्थानक ) नाग देवाची मुर्ती

कांचीपुरम येथील नाग शिळा


केरःळमधील थिसुर येथील सक्तानथंवरन राजवाड्यातील सर्प कावु
दक्षिण भारतात आजही नाग उपासनेचे अस्तित्व अधिक आहे याचे कारण म्हणजे कवु किंवा सापांशी संबध असलेली झाडे (उत्तर भारतातील नागवन सारखी) आढळतात ज्यांना विशाट्टम कवु किंवा विष मंदिर किंवा नागकोट्टा म्हणून ओळखले जाते. दक्षिण भारतात प्राचीन काळापासून नाग पूजा प्रचलित होती हे कन्नारमध्ये लिहिलेल्या बनवासी येथील शिलालेखावरून कळते, ज्यामध्ये इ.स. पहिल्या शतकाच्या मध्यात सापाच्या मुर्तीची उभारणी झाल्याची नोंद आहे. दक्षिण भारतातील जवळजवळ सर्व गावांमध्ये सापाची मुर्ती अजूनही दिसतात आणि हि शिल्प मंदिर संकुलात किंवा अस्थव वृक्षाखाली किंवा मोठ्या मंदिर संकुलात स्वतंत्र देवस्थान म्हणून देखील दिसतात.
बाजारपेठेतील_शिळेवरील_शेषनाग
किल्ले रायगडवर हुजूरबाजाराची म्हणजेच बाजारपेठ बसवून नुकतीच सुरुवात झाली होती, आता हिंदुस्तानातील अनेक व्यापारांना अभय देऊन आणि सन्मानाने आमंत्रण देऊन त्यांना या बाजारपेठेत स्थायिक करणे गरजेचे होते. कारण तसे न केल्यास परकीय शत्रुंना यांचा गैरफायदा घेणे सोयीचे झाले असते. यासाठी महाराजांना कोणीतरी सन्माननीय आणि भरवशाचा व्यक्ती आवश्यक होता जो ह्या बाजारपेठेचा संपूर्ण कारभार बघेल आणि सर्व व्यापाऱ्यांचा विश्वास जिंकून घेईल, तेव्हा शिवरायांना आठवण झाली ती म्हणजे बाबाजीनाईक पुंडे यांची. नगर जिल्हातील श्रीगोंदे येथील परंपरागत सावकार घराण्यातील बाबाजी शिवरायांच्या पदरी सन्मानाने आश्रित होते. विजापूरच्या आदिलशाहीशी शिवरायांच्या झालेल्या तहानुसार ते विजापूर दरबारी १६६७ पासून स्वराज्याचे वकील म्हणून काम पाहत होते. १६७२ मध्ये तह मोडल्यामुळे ते पुन्हा विजापूर येथून निघून रायगडावर येण्यास निघाले. श्रीगोंदे येथील नाईक यांचा परंपरागत सावकारीचा पेशा असल्यामुळे महाराजांना यांची बाजारपेठेसाठी सावकार किवा महाजन पदी नियुक्ती करणे सोयीस्कर ठरले. कारण कोणा लबाड लांडगा, शत्रूचा हेर यास गाळा देऊन बाजारपेठेत निवास देणे धोक्याचे होते. त्यावेळी बाबाजीनी विचार केला, छत्रपती शिवाजी महाराजांच्या आश्रयाखाली त्यांना हे सोन्याचे दिवस लाभले आहेत ते फक्त आणि फक्त त्यांच्या आजोबांमुळे “शेषाबानाईक पुंडे”. बाबाजीना ही आपल्या आजोबांची पुण्यायी वाटू लागे. त्यामुळेच बाबाजीनी आपल्या आजोबांचे ऋण लक्षात घेऊन ७ व्या किवा ८ व्या दुकानाच्या मधल्या शिळेवर शेशाबाची स्मृती म्हणून त्यांनी “शेषनाग” कोरवुन घेतला. यापुढे बाबाजीनाईक यांचे अस्तित्व दर्शवणारा तो शेषनाग हुजुरबाजाराचे वैभव दर्शवू लागला. आजही आपण त्या बाजारपेठेत फेरफटका मारताना त्या शेषनागाच्या शिळेजवळ क्षणभर थांबतो आणि त्याचे दर्शन घेतो. आपण जर नीट निरीक्षण करून पाहिल्यास असे दिसते कि हा एक फणा असलेला साधा नाग नसून छोटे छोटे असे सात फणे असलेला शेषनाग आहे. भोसले घराण्याशी प्रामाणिकता दर्शवणाऱ्या शेषाबानाईक यांची ती स्मृती आहे...!
नाग स्थापत्य कलेचे अनुपम उदाहरण - मामा भांजा मंदिर ....!
संस्कृती नागपूजनाची
केवळ रायगडच नव्हे तर संपूर्ण भारतात नागपूजन होत असते. सध्याच्या काळात जसा नागपंचमी हा सण साजरा होतो, तसा प्राचीन काळात नागांचा उत्सव ‘नागमह’ नावांने साजरा होत असे. हजारो वर्षांत नागपूजेचे केवळ स्वरूप बदलत आले, पण मूळ गाभा तसाच आहे. यक्षपूजेप्रमाणेच नागपूजेचाही हिंदू, जैन आणि बौद्ध धर्माशी समन्वय दिसून येतो. नागांना या धर्मांत उपदेवतांची स्थाने मिळाली. मथुरेजवळील सोंख येथे डॉ. हर्बट हर्टल यांनी जे उत्खनन केले त्यात तेथे कुषाणकाळांतील म्हणजे अंदाजे दुसऱ्या शतकातील एक सुंदर नागमंदिर असल्याचा पुरावा हाती आला. हे नागमंदिर विटांचे असून अर्ध-लंबवर्तुळाकार होते. याच परिसरातून अप्रतिम कलाकृती असलेली नागशिल्पेही मिळाली. यावरून मथुरा हे कुषाण काळात नागपूजेचे एक मोठे केंद्र असल्याचे सांगता येईल. या काळांतील सुरूवातीच्या मूर्तींमध्ये मानवी रुपातील नाग दाखवून त्याच्या पाठीमागे सर्पाची वेटोळी किंवा उभा साप दाखवला जात असे. फर्ग्युसन आणि ओल्डहॅम या तज्ञांच्या मते हे नाग म्हणजे सर्पपूजक मानव असावेत. सर्प हे त्यांचे वंशचिन्ह. पुढे हेच मानव नाग किंवा सापाशी तादात्म्य पावले. नागाशी संबंध असलेल्या देवांना मानव रूपांसह नागरूपांत दाखविण्याची पद्धत इसवीसनाच्या आधीपासूनच होती. सांची, अमरावती याठिकाणच्या बऱ्याचशा मूर्त्यांमध्ये नाग किंवा सर्पफणा असलेल्या स्त्रीया आढळतात. या सापाचा फणा छत्रासारखा डोक्यावर उभारलेला असायचा. यातील डोक्यावरील सर्प फणांची संख्या त्या पुरूषांच्या किंवा स्त्रीयांच्या सामाजिक हुद्द्यावर अवलंबून होती. या रचनांमध्ये कालांतराने बदल होऊन मानव प्रतिमांच्या मागे सर्पफणा दाखवण्याऐवजी मानवाचे मुखच सर्पाफण्याचे दाखवण्याची पद्धत सुरू झाली. या नागांच्या शरीरावर खवले दाखवणे, मस्तकावर स्वस्तिक किॆवा इतर शुभचिन्हे दाखवणे इत्यादी प्रकारही होते. या नागांच्या सळसळत्या जिभाही काही प्रतिमांमध्ये अंकीत केल्या गेल्या आहेत. कुषाणकाळानंतर मात्र नागप्रतिमांमध्ये जुनी वैशिष्ट्ये नाहीशी झाली. पुढच्या काळात वेटोळे घातलेला नैसर्गिक साप सर्वत्र दिसू लागला. याचबरोबर एकाच दगडावर कोरलेले नाग-नागीण शिल्पही तयार होऊ लागले. अंबरनाथ येथील सुप्रसिद्ध शिवमंदिराच्या बाहेरच्या बाजूला नदीकाठावर असे शिल्प आहे. या प्रकाराला दक्षिणेत ‘नाग-कल’ म्हणतात. या प्रतिमांमध्ये सध्या आढळणारा सर्वसामान्य प्रकार म्हणजे उभा साप. आवासच्या नागोबा मंदिरातील प्रतिमा याच स्वरूपाच्या आहेत. रायगड किल्ल्यावरील बाजारपेठ मानल्या जाणाऱ्या वास्तूवरही असाच एक उभा साप कोरला आहे. नागांचा पाण्याशी जवळचा संबंध असतो. त्यामुळे बऱ्याचशा नाग मूर्त्या पुष्करणींच्या किंवा तलावांच्या काठावर आढळतात.
सुदैवाने नागांचे पूजन अजूनतरी प्रतिमा रूपातच मर्यादित आहे. नागपूजनाच्या पद्धतीविषयक संत कबीर म्हणतात,
“नाग पंचमी आवे जदे, कोले नाग माँडती,
दूध दही से पूजती।
साँची को नाग सामें मिल जावे तो,
पूजा फेंकी ने भाग जाती रे।।”
थोडक्यात माणसे पूजेसाठी नागाची मूर्ती मांडतात खरे , पण खरा नाग आल्यावर
मात्र पळत सुटतात. त्यामुळे केवळ प्रतिमाच नव्हे तर जीवसृष्टीत
महत्त्वपूर्ण भूमिका बजावणाऱ्या सापांचेही रक्षण व्हावे ही अपेक्षा.
चला जाऊ वारुळाला, नागोबाला पुजायला : आनंद साऊरकर
पुराणात नऊ नागकुळ प्रसिद्ध आहेत :
अनन्तं वासुकिं शेषं पद्मनाभं च कम्बलं
शन्खपालं ध्रूतराष्ट्रं च तक्षकं कालियं तथा
एतानि नव नामानि नागानाम च महात्मनं
सायमकाले पठेन्नीत्यं प्रातक्काले विशेषतः
तस्य विषभयं नास्ति सर्वत्र विजयी भवेत
ll इति श्री नवनागस्त्रोत्रं सम्पूर्णं ll
(भिंतीवरील नाग प्रतिमा, फुलोरा आणि सर्वसाधारण नागकुळाचे रेखाटन)(avs)
नैवेद्य: पाच प्रकारचे धान्य जसे गहू, ज्वारी, तांदूळ, हरबरा आणि तीळ हे भाजून घेऊन याच्या लाह्या तयार करतात. ह्या लाह्यांचा व फुटाणे याचा नैवेद्यात आवर्जून वापर करतात. नऊ पुरिका (रव्याच्या पापड्या), नऊ करंज्या, वेणी-फुगी यांचा फुलोरा नागकुळावर टांगतात. काहीठिकाणी वाफवलेले, तर कुठे तळलेले पदार्थ स्वयंपाकाला बनवतात. स्वयंपाकात मेथीची भाजी आणि रव्याचा शिरा मुख्य असतो. तव्याचा वापर सुद्धा बरेच ठिकाणी करत नाहीत. नागकुळाला रव्याचे दोन लाडू बनवून त्याचा नैवैद्य घरी दाखवून ते वारुळावर अर्पण करतात. शेवटी नागाला विडा- सुपारी अर्पण करतात. कुठे नारळ अर्पण करून तो वारुळावर नेऊन वाढवतात. घरची पूजा आटोपल्यावर वारुळावर किंवा नागाच्या ठाण्यावर जाऊन पूजा करतात. आणि रव्याचे लाडू अर्पण करतात. घरी आल्यावर नागाला अर्पण केलेले दूध, ज्यांनी नाग काढले ते मिश्रण, भाजलेले पंच धान्य आणि फुटाणे एकत्र करून ते घरातील कानाकोपऱ्यात, अंगणात टाकतात. ज्ञात-अज्ञात सर्व सरपटणाऱ्या प्राण्यांना हा नैवेद्य.
वीरगळ :-
जगभरात प्राचीन काळापासून मृत व्यक्तींचं स्मृती स्मारक उभारण्याची प्रथा आहे. भारतीय द्वीपकल्पात स्मृती स्मारकं उभारण्याची सुरुवात मेगॅलिथिक म्हणजेच महापाषाण काळापासून झाली. या काळातले लिखित पुरावे नसल्यामुळे आपल्याकडे या स्मारकांची मर्यादित माहिती उपलब्ध आहे. या काळाच्या शेवटच्या टप्प्यात स्मारक शिळा उभारण्यामागचा हेतू तमिळ भाषेतील संगम साहित्यात सापडतो. इ.स. पूर्व तिसन्या शतकापासून स्मारकशिळांची निर्मिती झालेली आहे. पुढे या प्राचीन स्मारक शिळांचं रूपांतर वीरपूजेत झालं. युद्धात वीरमरण आलेल्या वीरांची स्मृती जपणा-या स्मारकांमध्ये, म्हणजेच वीरगळांमध्ये वेगवेगळ्या कालखंडांत झालेले बदल तत्कालीन सामाजिक आणि सांस्कृतिक बदल समजून घेण्यासाठी उपयोगी पडतात. त्यातून राजकीय इतिहास, लिपी, भाषा, स्थापत्यशैली समजते. त्यामुळे वीरगळांचा अभ्यास महत्त्वाचा ठरतो, महाराष्ट्रातल्या बीरगळांबाबतही तेच म्हणता येईल.हतो वा प्राप्स्यसि स्वर्ग जित्वा वा भोक्ष्यसि महिम् ।
तस्मादुतिष्ठ कौन्तेय युद्धाय कृतनिश्चय ॥
आपल्या शास्त्रानुसार फार पूर्वीपासून युद्धांमध्ये वीरमरणाची प्राप्ती व्हावी याला अपार महत्व दिले गेलंय. आणि अशा या वीरांचे स्मरण येणाऱ्या पिढीला कायमस्वरूपी होत राहावं म्हणून जो शिल्प विशेष उदयाला आला तो म्हणजे विरगळ (Herostone )! वीरगळ समजून घेण्यासाठी त्याच्या मुळ संरचनेला समजून घ्यावं लागतं. काळ आणि स्थानपरत्वे त्याच्या रचनेत थोडं भिन्नत्व आहे परंतु वीर मरण आलेल्याचं स्वर्गरोहण आणि स्वर्गप्राप्ती या मूलभूत गोष्टी प्रत्येक शिल्पात आढळून येतात .
यांत्रिकीकरण आणि औद्योगिकरणाच्या आधीच्या युगात पशुधन हे पण माणसाची मालमत्ता समजली जाई . ब्रिटीश काळात आणि थोडं त्यापूर्वीच्या काळात ओसरीवर झोपाळा , स्वतःची विहीर आणि गुराढोरांचा पसारा असणारा माणूसही श्रीमंत समजला जाई . शेतीसाठी पशूपालनाची गरज आणि त्या निमित्ताने का होईना पशू पक्ष्यांशी माणसांचा जिव्हाळा होता . वैदिक काळात तर गायींचा वापर चलन म्हणून केला जाई . मग कालांतराने विकत घेतलेल्या वस्तूच्या मोबदल्यात अर्धी गाय किंवा पाव गाय देणे शक्य नसल्याने इतर वस्तूंची देवाणघेवाण सुरु झालं . याची अखेर चलन व्यवस्थेत झाली तरी पशुधन, गोधन हे शब्द आजही व्यवहारात आहेत . ( संदर्भ : - प्राचीन भारतीय नाणकशास्त्र , एम. के . ढवळीकर ) .
वीरगळांबाबत ज्येष्ठ इतिहास अभ्यासक मधुकर ढवळीकर म्हणतात, "गुप्तोत्तर काळात पर्यावरण प्रतिकूल होतं, दुष्काळ पडलेला होता. त्यामुळे शेती करणं अवघड झालं. या काळात शेतीचा व्यवसाय खालावून लोक पशुपालनाकडे वळले. शेती बंद पडत आली, व्यापार मंदावला. त्यामुळे मोठ्या प्रमाणावर स्थलांतर सुरू झालं. गावात बस्ती करून राहणारे लोक फार कमी राहिले. त्यामुळे चोऱ्यामाऱ्या वाढल्या. चोरण्यासारखं फारसं काही राहिलं नाही म्हणून गाईगुरांच्या चोऱ्या होऊ लागल्या. ह्या पशुधनावर अनेकदा हल्ले होत असत . कधी श्वापदं ( वाघ , सिंह , कोल्हा इत्यादी ) , तर कधी टोळीयुद्ध, तर कधी चोर दरोडेखोर, इतर राज्यातले सैनिक इत्यादी पशुधनावर हल्ला करत असत . अशा वेळेला स्वतःचं पशुधन वाचवायला लोक प्राणांची बाजी लावायला ही कमी करत नसत. चोरांची धाड पडल्यानंतर गावातील तरुण मंडळी त्याचा प्रतिकार करत. आणि जर या प्रसंगात ते मृत्यूमुखी पडले तर त्यांच्या बलिदाना प्रित्यर्थ त्यांच स्मारक दगडात घडवलं जाई जे येणाऱ्या पिढ्यांना साक्ष देई .
शूरवीरांच्या पराक्रमगाथा सांगत असलेले हे स्मारक आज मात्र काहीसे दुर्लक्षित आहे. चला त्यांच्या कथा व्यथा जाणून घेऊयात.
वीरगळ हा शब्द ‘वीरकल्लू-वीरकळ-वीरगळ’ याप्रकारे महाराष्ट्रात रूढ झाला. कल, कल, कल्लू’ या कानडी शब्दाचा अर्थ ‘दगड’ असा होतो. दक्षिणेत वीरगळास ‘वीरकळ’ तर उत्तरेत ‘वीरब्रम्ह’ म्हणतात . इंग्रजीत वीरगळास ‘Herostone’ असे संबोधतात. थोडक्यात वीरगळ म्हणजे वीराचा दगड, अर्थात वीराच्या स्मृतीप्रित्यर्थ उभारलेला दगड. वीरगळ हा शब्द पुल्लिंगी आहे.

वीरगळचा इतिहास :
अभ्यासकांच्या मते , महाराष्ट्रात आढळणारे वीरगळ साधारण आठव्या ते तेराव्या शतकातील आहेत. नंतरच्या काळात अगदी १८ व्या शतकापर्यंत वीरांच्या स्मरणार्थ उभारलेल्या शिळांवर वीरशिल्प आढळते. कर्नाटकातील वीरगळांवर शिलालेख असल्याने त्या वीराबद्दल आणि वीरगळबद्दल माहिती समजते. महाराष्ट्रातील वीरगळांवर मात्र शिलालेख आढळत नाही. त्यामुळे वीराचे नाव, त्याच्या मृत्यूची तिथी, युद्धप्रसंग याबाबत इतिहास मूक आहे. वीरगळ अभ्यासताना त्यावर शिलालेख नसल्याची उणीव नेहमी भासते. बऱ्याच वीरांचा इतिहास अंधारात राहिला.
महाराष्ट्रात वीरगळांचे दोन प्रकार दिसतात : एका प्रकारात वीराच्या दगडावर तीन-चार–बहुधा तीन–चौकटी कोरून यांत काही प्रसंग कोरतात. तीन चौकटी असलेल्या वीरगळावर सगळ्यात खालच्या चौकटीत जेथे तो वीर धारातीर्थी पडला, तेथील युध्दप्रसंग कोरलेला असतो. युध्दप्रसंगांत बरेच वैविध्य असते. उदा., ढाल-तलवारींनी समोरासमोर लढणारे सैनिक, घोडेस्वारांची लढाई, गाईच्या चोरीवरून लढाई झाली असल्यास गाईंचा कळप एका बाजूला असतो. त्याला गोवर्धन शिल्प म्हणतात. नाविक युध्द असल्यास अनेक वल्ह्यांच्या नावा दिसतात. खालून दुसऱ्या चौकटीत, वीरगती पावलेल्या माणसाला अप्सरा कैलासाला नेत आहेत, असे चित्र कोरलेले असते. हा प्रवास कधी पालखीतून, तर कधी रथातून होताना दिसतो आणि सगळ्यांत वरच्या चौकटीत कैलासामध्ये शिवाच्या पिंडीची पूजा करताना तो वीर दाखविलेला असतो. वीरगळाच्या सर्वांत वरच्या बाजूला देवळाच्या कळसासारखा भाग दिसतो व त्याच्या दोन्ही बाजूंस चंद्र-सूर्य कोरलेले असतात. जोपर्यंत चंद्र-सूर्य उगवत आहेत, तोवर ह्या वीराची कीर्ती कायम राहील, हे ह्यातून सांगावयाचे असते. वीरगळावर कधीकधी चार वा पाच चौकटीही असतात. क्वचित दगडाच्या चारही बाजूंवर कोरीव काम केलेले आढळते. ह्या प्रकारातील वीरगळांचा काळ अकरावे ते तेरावे शतक असा सांगता येईल. दुसऱ्या प्रकारात अर्धउठावातील मानवी आकृती दिसते. ह्या प्रकारातले ‘वीर’ सतराव्या-अठराव्या शतकांतील आहेत, असे त्यांच्या शैलीवरून म्हणता येते. महाराष्ट्रातील बहुतांश वीरगळ हे शिलाहारकाळ आणि यादवकाळात मोठ्या प्रमाणावर उभारले गेले.
कर्नाटकातल्या वीरगळांशी महाराष्ट्रातल्या वीरगळांचे विशेष साम्य आहे. कर्नाटक-महाराष्ट्रातील वीरगळांवर वीर हा कैलासावर शिवाची पूजा करताना दिसतो; कैलासवासी होतो. मात्र कर्नाटकातील गदगसारख्या काही ठिकाणी तो शिवाऐवजी विष्णूची वा नरसिंहाची पूजा करताना दिसतो; वैकुंठवासी होतो. शैव-वैष्णव वादाची छाया वीरगळांवर ही पडलेली दिसते.
कर्नाटकातील ‘वीर-कलां’ चे थोडे सूक्ष्म निरीक्षण केल्यास त्यांचे मूळ ‘स्मृतिमंदिरां’त असल्याचे स्पष्ट होते. अनेक ‘वीर-कलां’वर, चित्रचौकटींवर मंदिरांच्या प्रतिकृती कोरलेल्या आहेत. द्राविड मंदिरशिल्पाच्या प्रतिकृती स्पष्ट दिसतात. राजघराण्यांतील व्यक्तींच्या स्मरणार्थ देवांची मंदिरे बांधली जात. सामान्य माणसे मंदिरे बांधण्याऐवजी त्यांच्या छोटेखानी प्रतिकृती निर्माण करून वीरांची स्मृती जतन करीत. वीरगती पावलेल्या माणसांच्या स्मरणार्थ राजस्थानात ‘पालिया’ उभारतात. मात्र येथे बऱ्याच वेळी दगडाऐवजी लाकडाचा वापर करून स्तंभ उभारले जातात. कधी फलकांचाही ह्यासाठी वापर केला जातो.
महाराष्ट्रातल्या वीरगळांची माहिती घेण्याआधी वीरगळांचं वाचन कसं करायचं हे समजून घ्यायला हवं. वीरगळ वाचण्याची सोपी पद्धत म्हणजे तो उलट दिशेने, म्हणजेच खालून वर पाहायचा.

छायाचित्रावरून वीरगळ रचना सहज लक्षात येईल.
महाराष्ट्रात सापडलेले वीरगळ साधारणपणे तीनच कप्प्यांचे असतात. वीरगळ वाचन नेहमी तळातील चौकटीपासून वरपर्यंत करावे. त्यामुळे घटनाक्रम व्यवस्थित समजतो.
युद्धात गावकरी ,सामान्य शेतकरी यांच्यापासून ते सेनापती, राज्यापर्यंत कोणीही मृत्युमुखी पडे.या वीरांच्या अधिकारपदानुसार वीरगळात काही फरक असतात.
२) स्वर्गारोहण प्रसंगात वीरासोबत जितक्या जास्त अप्सरा तितका तो वीर मोठा समजावा. मोठ्या पदावरचे वीर पालखीतून स्वर्गारोहन करताना दाखवतात.
३ ) सामान्य वीराला शिवलिंग पूजनाचा मान मिळतो. मात्र वीर मोठ्या पदावरचा असेल तर त्यास नंदीवरील शिवलिंग किंवा भगवान शिवपूजनाचाही मान मिळतो. तसेच स्वर्गात त्याच्यासोबत जास्त शिवगण दाखवतात. शिवगण वाद्ये वाजवताना दिसतील.
४ ) मोठ्या पदावरील वीरांच्या वीरगळात शिखर कोरतात. तिथे शुभलक्षणी चिन्हेही दाखवतात.
असाच एक पशुधनाशी संबंधित एक वीरगळ आपण पाहणार आहोत .

वीरगळ असेच झाडाच्या कडेला टेकवून ठेवलेले दिसत आहेत . न जाणो किती ऊन पावसाळे पाहीले असतील त्यांनी !

वर्षानुवर्षांच्या ऊन पावसाच्या आघाताने झिजलेला वीरगळ
वर दाखवलेला आणि झिजलेला वीरगळ दिसतो . वीरगळावर बहुतेक वेळा कोणत्याही प्रकारचं लेखन केलं जात नाही . त्यामूळे त्याच्या इतिहासाचा स्पष्ट मागोवा घेता येत नाही . तरीही त्याच्या वेगवेगळ्या टप्प्यांमधून प्रसंग पुन्हा एकदा उभा केला जाऊ शकतो. सदर वीरगळ झिजला असल्याने त्याला थोडं संपादित करून समजता येईल असा प्रयत्न केला आहे .

कप्पा क्र १ - सर्वात खालचा कप्पा .
वीरगळाच्या निर्मितीचं मुख्य कारण सर्वांत खालच्या कप्प्यात चित्रित केलेलं असतं. सर्वसाधारणतः वीरगळाचा सर्वात खालचा कप्पा हा त्याच्या मृत्युचं कारण दर्शवतो .या कप्प्यात काही वेळा आडवा पडून मृत झालेला वीर दाखवलेला असतो, तर बहुतांश वेळा तो कशामुळे मरण पावला त्या प्रसंगाचं चित्रण असतं. महाराष्ट्रात मिळालेल्या काही वीरगळांवर सर्वांत खालच्या भागात मृत वीराचं मोठं शिल्प आढळतं. या कप्प्यात दाखवलेल्या लढायांवरून ती पायदळ, हत्तीदळ, घोडदळ यांच्यापैकी कशाची लढाई आहे हे समजतं. ती लढाई पशुधनाच्या संरक्षणासाठी झाली असेल तर त्या कप्प्यात गाईगुरांचं शिल्प असतं. लढणारा वीर कोणत्या हुद्द्यावर होता हे काही शिल्पांमधून सांगता येतं. उदाहरणार्थ, दंडनायक या प्राचीन पदावरचा वीर हा एकटा लढताना दाखवला जात नाही, त्याच्या बरोबरीला त्याचे इतर सैनिक असतात. शिवाय त्याच्या डोक्यावर छत्र धरलेलं असतं. यात मृत पावलेला बीर कोणता आहे हे दाखवण्यासाठी त्याचं शिल्प इतर सैनिकांपेक्षा आकाराने मोठं असतं, लढणारे चीर धनुष्य, खड़ग, भाला, कट्यार यांच्याद्वारे लढताना दाखवतात, कधी हा वीर घोड्यावर स्वार असती, तर कधी हत्तीवर, यावरून त्या मृत वीराचा दर्जा लक्षात येतो. घोडद्यावरच्या वीराने खूप पराक्रम गाजवला आहे हे दाखवताना त्याच्या घोडाखाली मरण पावलेली माणसं दाखवली जातात, तो वीरगळ सेनापती किंवा राजाचा असेल तर तो अंबारीत बसलेला दाखवला जातो. त्याच्या आजूबाजूला त्याच्या राज्याचा ध्वज घेतलेले सैनिक, अब्दागिरी घेऊन उभी असणारी माणसं असतात. हा झाला पहिला कप्पा,
वरील फोटोत सर्वात खालच्या कप्प्यात ( पिवळ्या रंगात ) वीर मरून पडलेला दिसतो . त्याच्या सभोवती ( पांढऱ्या रंगात ) पशुधन उभे दिसते. प्रथमदर्शनी पाहताना असे वाटू शकते की तो वीर त्यांच्या पायदळी आला असावा . मात्र ते तसं नसून त्यांना वाचवताना तो धारातिर्थी पडला असं अभिप्रेत आहे.
कप्पा क्र . २ खालून दुसरा कप्पा
मधला कप्पा हा कप्पा घनघोर युद्ध दर्शवतो. दुसऱ्या भागात मृत वीराला घेऊन जाणाऱ्या अप्सरा दाखवलेल्या असतात. अप्सरा हवेत उडणाऱ्या असल्यामुळे त्यांनी वीराला दोन्ही बाजूनी धरलेलं असतं. बहुतांश वेळा या कप्यात दोनच अप्सरा असतात; परंतु महत्वाचा सैनिक, दंडनायक, सेनापती असेल तर त्यांची संख्या चार ते सहापर्यंत बादते. इये कधी मृत वीर मखरात बसलेला दाखवलेला असती, तर काही ठिकाणी ती पालखीत बसलेला दिसतो. मृत वीर आणि त्याच्या पत्नीचा वीरगळ एकत्रित असेल तर ते मखरात बसलेलं दाखवतात. या कप्प्यात काही आसरा चवर्या ढाळत आहेत, हातांत कुंभ घेऊन उभ्या आहेत असंही दाखवलेलं असतं. यातील अप्सरांची केशरचना आणि त्यांच्या अंगावरील आभूषणं वेगवेगळी असবার,
वरील फोटोत धारातिर्थी पडलेला वीर ( पिवळ्या रंगात डावीकडे ) हातात ढाल आणि तलवार ( हिरवा रंग ) घेऊन लढताना दिसतो . तर त्याच्या समोर घोड्यांवर ( पांढरा रंग ) बसून हातात तलवारी ( हिरवा रंग ) घेऊन दोन स्वार ( पिवळा रंग ) येताना दिसतात . लढाई तुल्यबळ नसली तरी अशा सेने समोर धावून जाऊन त्वेषाने लढण्याचा पराक्रम वीराने केलेला दिसतो .
कप्पा क्र . ३ खालून तिसरा कप्पा
हा कप्पा वीराला वीरगती प्राप्त झाली असं दर्शवतो. सर्वांत वरच्या कप्प्यात मृत वीर शिवपिंडीसमोर हात जोडून उभा किंवा मांडी घालून बसलेला असतो, त्या शिवलिंगाच्या खाली किया समोर अनेकदा नंदी असतो, तर त्याच्या दुसऱ्या बाजूला हातात धुपारती किंवा घंटी घेतलेला लांब केसांचा योगी गुरू उभा असतो. या योग्याचा एखादा शिष्य अनेकदा त्याच्यासोबत असती, तर मृत वीर महत्वाचा असेल तर त्याच्याही मागे त्याचा सेवक उभा असतो. या कप्याच्या वर डाव्या-उजव्या बाजूला सूर्य-चंद्र दाखवलेले असतात, तर सर्वांत शेवटी वर एक मंगल कलश असतो.
वरील फोटोत डावीकडे एक पुरोहीत ( पिवळा रंग ) ( जटाभारा वरून ओळखावं ) शिवपिंडीवर भस्मलेपन करताना आणि मंत्रोच्चारण करताना दिसतो . उजवीकडे दोन वीर ( पिवळा रंग ) शिवलिंगाची पूजा करताना दिसतात . वीर मरणामुळे झालेली स्वर्गप्राप्ती ह्या कप्प्यात दर्शवतात .
कप्पा क्र . ४ सर्वात वरचा कप्पा .
हा कप्पा कलश ( आकाशी रंग ) दर्शवतो . सदर कलश हा त्या वीराला मोक्ष प्राप्त झाला याचं प्रतिक आहे . सर्वसाधारणतः कलशाभोवती वाघ, सिंह किंवा शरभ ( शरभ म्हणजे ? ) हे कलशाचे संरक्षक म्हणून कोरले जातात . किंवा सुर्य चंद्र ( यावत् चंद्र दिवाकरो ) कोरले जातात . सदर वीरगळावर कलशाभोवती जे काही कोरलं आहे ते अत्यंत अस्पष्ट आहे त्यामुळे त्यावर भाष्य करणं उचित ठरणार नाही .
चौकट प्रसंगात व शिखरात आढळणारी विविधता :
बहुतांश वीरगळांमध्ये चौकटप्रसंगातील क्रम सारखा असतो . खालपासून वरपर्यंत ‘युद्धप्रसंग- वीराचे स्वर्गारोहण – स्वर्गवासी वीर – शिखर याच क्रमाने शिल्पे कोरतात. यामध्ये आढळणारी विविधता....१} युद्धप्रसंग :-
वीरगळ मध्ये तळातील चौकटीत तो युद्धप्रसंग कोरतात, त्यात वीरास वीरमरण येते. काहींमध्ये तळातील दोन चौकटीत दोन युद्धप्रसंग दिसतात. हे दोन्ही युद्धप्रसंग एकाच वीराचे असून एकाच किंवा लागोपाठच्या युद्धातील असतात. काही ठिकाणी तळातील चौकटीत धारातीर्थी पडलेला वीर दिसतो.
युद्धप्रसंगात वीर व त्याच्याविरूद्ध लढणारे शत्रू यांची शिल्पे दिसतात. वीरांची वेशभूषा, शत्रूसंख्या, सर्वांच्या हातातील शस्त्रे यांचे निरीक्षण करावे.
येथे- पायदळ, घोडदळ, गजदळ, नौकायुद्ध, द्वंद्वयुद्ध यांसारखे विविध युद्धप्रकार आढळतात.
छायाचित्रे –

(१.१) यामध्ये एक वीर ढाल तलवार घेऊन दोन शत्रूंपासून लढताना दिसतो. हे पायदळातील युद्ध आहे.

१.२) या छायाचित्रात वीर एका शत्रूसोबत तलवारीने लढताना दिसेल. हे द्वंदयुद्ध आहे.

(१.३) येथे दोन युद्धप्रसंग आढळतात. प्रथम वीर चार पायदळ सैनिकांविरुद्ध लढत आहे. त्यावरच्या चौकटीत तो अश्वावर स्वार होऊन लढताना दिसेल.
हे दोन्ही युद्धप्रसंग एकाच किंवा लागोपाठच्या युद्धातील आहेत.

(१.४) यामध्येही दोन युद्धप्रसंग दाखवले आहेत. पहिल्या प्रसंगात वीर हत्तीवर स्वार होऊन लढत आहे. त्यावरच्या चौकटीत तो पायीच एका घोडेस्वार शत्रूविरुद्ध लढतोय.

(१.५) यामध्ये शेवटच्या चौकटीत धारातीर्थी पडलेला वीर दिसतो. त्यावरच्या चौकटीत तो दोन शत्रूंसोबत लढत आहे. असा प्रसंग कोरला आहे. त्याच्या हातात ‘फिरंगी’ तलवार आहे.
२} स्वर्गारोहण :-
युद्धप्रसंगाच्या वरच्या चौकटीत वीराचे स्वर्गारोहण दाखवतात. धारातीर्थी पडलेल्या विराला अप्सरा कैलासात नेत आहेत , या आशयाचे शिल्प असते. वीर नेहमी मध्यभागी असतो.
वीरासोबत जितक्या जास्त अप्सरा, तितका तो वीर मोठ्या पदावरचा समजावा. काही ठिकाणी विराला पालखीचा मान मिळतो.
छायाचित्रे :

(२.१)या वीरगळामध्ये वीरासोबत दोन अप्सरा दिसतात.

(२.२) यामध्ये वीरासोबत चार अप्सरा कोरलेल्या आहेत.

(२.३) वीर पालखीत बसून स्वर्गास गेलेला दिसतो.

(२.४)येथे वीर प्रथम पालखीतून व नंतर पायी चालत स्वर्गाकडे मार्गस्थ झालेला आहे.
३) स्वर्गवासी वीर:
सर्वात वरच्या चौकटीत वीर स्वर्गास गेलेला दाखवतात. वीर शिवलिंग पुजताना दिसतो. वीरासोबत शिवगणही आढळतील. वीर डाव्या बाजूस तर शिवगण उजव्या बाजूस असतात.
काही वीरगळांमध्ये वीर – फक्त शिवलिंग , काहींमध्ये नंदीवरील शिवलिंग पूजताना दाखवतात. काहींमध्ये तर वीराला प्रत्यक्ष भगवान शिव पूजनाचा मान मिळतो. वीराच्या अधिकारपदानुसार ही विविधता आढळते.काही दुर्मिळ वीरगळांमध्ये स्वर्गवासी झालेला वीर त्याची आराध्य देवता अथवा त्याच्या पंथाची देवता पूजताना दिसतो. मग ती विष्णू, सरस्वती, गणपती अशी कोणतीही असू शकते...
छायाचित्रे :

(३.१) यामध्ये वीर शिवलिंग पूजताना दाखवला आहे. सोबत एक शिवगणही दिसतो.

(३.२) यामध्ये वीर नंदीवरील शिवलिंग पुजत आहे. सोबत सहा-सात शिवगण सनई व इतर वाद्ये वाजवताना दिसतात.

(३.३) यामध्ये वीराला प्रत्यक्ष भगवान शंकर पूजन्याचा मान मिळाला आहे.
४} शिखर :
वीरगळांचा सर्वात वरचा भाग म्हणजे शिखर. काही वीरगळांमध्ये शिखर आढळत नाही.
शिखारामध्ये विविध शिल्पे – शुभलक्षणी चिन्हे कोरलेली असतात. येथे कलशासोबत पक्षी कोरले असतील तर त्यास कलशवाहक व प्राणी असतील तर त्यांना कलशसंरक्षक म्हणतात. याशिवाय येथे चंद्र-सूर्य, किर्तीमुख, कमळपुष्प यांसारखी शिल्पे आढळतात.
छायाचित्रे :

(४.१) या वीरगळामधील शिखरावर कलश कोरला आहे. कलश स्वर्गारोहनाचे प्रतिक आहे.

(४.२) यामध्ये कलशासोबत चंद्र सूर्यही कोरलेले आहेत. वीरांची कीर्ती आकाशात चंद्र सूर्य असेपर्यंत राहो, हा त्यामागचा उद्देश !

(४.३) या छायाचित्रात शिखरावर मयुरशिल्पे दिसतात. ते सुंदरतेचे प्रतिक आहेत.

(४.४) येथे शिखरावर रत्नशाखा व कमळपुष्प आढळते. ती समृद्धीची प्रतिके म्हणून कमळपुष्प कोरतात.

(४.५) या ठिकाणी काळाशासोबत सिंह दिसतो. येथे सिंह कलशसंरक्षक आहे.

(४.६) येथे कलश व त्याच्या बाजूला हत्ती, कीर्तिमुख आढळतात. ते कलशसंरक्षक म्हणून कोरले असावेत.

(४.७) या छायाचित्रात कलशासोबत मारुती दिसतो. हुतात्मा वीराचे इष्ट दैवत म्हणून मारुती कोरला असावा.

(४.८) या छायाचित्रात एक पादुका, ढाल व सतीचा हात कोरला आहे. या वीराची पत्नी सती गेली , त्यामुळे येथे सतीचा हात दिसतो.

(४.९) येथे शिखरावर कीर्तिमुख कोरलेले आढळते. कीर्तिमुख मनुष्याचे पाय खाते, अशी दंतकथा आहे.
गोधनगळ :
वीर जर त्याच्या गोधनाचे रक्षण करताना हुतात्मा झाला असेल तर त्याच्या स्मरणार्थ गोधनगळ उभारतात. यामध्ये शेवटच्या चौकटीत धारातीर्थी वीर त्याच्या गोधनासोबत दाखवतात. त्यावर युद्धप्रसंग , स्वर्गारोहण प्रसंग, स्वर्गवासी वीर, शिखर असे अनुक्रमे कोरतात.

व्याघ्रशिल्प असलेला वीरगळ:
वाघाला मारताना वीर मुत्युमुखी पडला असेल तर त्याच्या स्मरणार्थ व्याघ्रगळ उभारला जाई.यात तळातल्या चौकटीत वीर वाघासोबत लढताना दाखवला जात असत. त्यावर स्वर्गारोहण , स्वर्गवासी वीर, शिखर कोरलेले असत.

स्तंभ वीरगळ :
काही ठिकाणी एकाच दगडाच्या चारही बाजूला चार वीरगळ कोरलेले आढळतात. ते चार वेगवेगळ्या वीरांच्या स्मारके असतात.या चारही वीरगळमधील चार वीर एकाच कुटुंबातील/गावातील असतात. ते सर्व एकाच युद्धात मारले गेले असतील, तर त्यांचे स्मारक अशा स्वरूपाचे आढळते.

वीरांगनागळ :
इतिहासातील काही वेळा पुरुषांच्या बरोबरीने स्त्रियांनाही रणांगणात उतरावे लागले. या युद्धात योद्धा स्त्रियांना वीरमरण आले. म्हणूनच त्यांच्या स्मरणार्थ वीरगळप्रमाणे वीरांगनागळ उभारली गेली.

आत्मबलिदानवीरगळ :
ही दुर्मिळ प्रकारची वीरगळ . युद्धदेवतेस बळी लागतोच अशी आपल्याकडे समजूत आहे. त्यामुळे युद्ध सुरु होण्याआधी एखादा धैर्यवान वीर आपली मान कापून शीर समरभूमीस अर्पण करी. त्याच्या स्मरणार्थ आत्मबलिदानवीरगळ उभारीत. फलटण शहरातील स्मशानभूमीजवळ आत्मबलिदानगळ पहायला मिळते.
काही विषेश वीरगळ :-
कदाचित याचीच परिणीती म्हणून ही वीरगळ आपण पाहू शकतो. यावर इष्ट देवता म्हणून जीन मूर्ती कोरलेली आहे. युद्धात वीरमरण प्राप्त झालेला वीर इथं योग मुद्रेत बसलेला असावा.
आश्चर्य वाटतंय ना, तर हो ह्या विरगळीवर दहातोंडांचा धनुर्धारी रावण कोरलेला आहे. कुठं आहे हा आगळा वेगळा विरगळ आणि हे दशाननाचे अंकन नेमकं का केलेलं असावं ?

आसूदच्या केशवराज मंदिर पाहून मुरुडच्या दिशेने निघालो कि रस्त्यात एका वळणावर एका लहान शेड वर दुर्गादेवी मंदिर अशी पाटी दिसते. या मंदीरात वीरगळीच्या आकाराची एक कोरलेली शिळा दिसते. दोन भागात विभागलेल्या ह्या शिळेवर खालच्या भागात दोन्ही बाजूला दोन स्तंभाकृती आणि त्यांच्या मध्ये गाईचे दूध पिणारे वासरू अशी आकृती कोरलेली आहे. शिळेच्या वरच्या भागात दोन्ही बानूला दोन स्तंभ त्यांच्या मध्ये एक वरच्या बाजूला निमुळता होत जाणारा, सर्पकृतीने वेढलेला कळसासारखा भाग, ह्या कळसाला पाठीमागून आधार देणारी एक व्यक्ती आणि त्याच्या दोन्ही बाजूना नमस्कार मुद्रेत बसलेल्या इतर दोन व्यक्ती असा प्रसंग कोरलेला आहे. ही शिळा धेनूगळ असावी. मात्र शिळेच्या वरच्या भागातील मधोमध असलेल्या कलशाकृतीचे नेमकं प्रयोजन कळून येत नाही. सोबतच ह्या धेनूगळच नेमकं कोणत्या कारणाने दुर्गादेवी म्हणून नामकरण झालं असावं हे हु कळून येत नाही. दापोली-हर्णे-मुरुड परिसरात भटकंती करताना हे सुंदर शिल्प पाहायला विसरू नका.

वृषभावीण न होय शेती । कृषिकर्मावीण न धान्योत्पत्ति ।
धान्यावीण न बलसंपत्ती । आणि बलधनावीण सौख्य नसे ।।
यासाठी कृपा करून । सोडी अवघें गोधन । निजशिशूचें हनन । कदा मातेने करूं नये ॥
: गोदावरी महात्म
नंदीने कैद केलेल्या देवांच्या गोधनाची सुटका करवण्यासाठी देवांनी नदीकडे केलेल्या या याचनेत आपल्याला एकूणच गोधनाचे महत्व समजते, गोदावरी महात्म्यात आलेला हा श्लोक गोधनाची महती शतकानुशतके सांगत आहे.
कदाचित म्हणूनच की काय महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात मिळणाऱ्या बहुतांश विरगळी ह्या गोधन संरक्षक प्रकारातील असतात.
गोधनाच्या संरक्षणार्थ मातीसाठी प्राण अर्पण करणाऱ्या वीराच्या स्मृती सांगणारा हा वीरगळ..

उंबर्डी, या रायगड जिल्ह्यातील लहानश्या गावात पुरातन शिवमंदिराच्या परिसरात अश्याच अनेक वीरगळी उभ्या आहेत, तर काही अजूनही मातीखाली असून इतरत्र पडलेल्या आहेत. ही वीरगळ उभ्या आयताकृती दगडावर कोरलेली असून, वीरगळ चार भागात विभागलेली आहे. वीरगळीच्या सर्वात खालच्या भागात वीरमरण प्राप्त झालेला वीर दाखवलेला आहे.
त्याच्या वरच्या भागात युद्धप्रसंग कोरलेला आहे, डाव्या बाजूला हातात भाला घेऊन शत्रूसैन्याशी लढणारा वीर असून, त्याच्यावर समोरून तीन शत्रुसैनिकांनी हल्ला केलेला आहे, विराने एका शत्रुसैनिकाला यमसदनी धाडलेले असून तो सैनिक विराच्या पायाजवळ पडलेला पाहायला मिळतो. युद्धप्रसंगाच्या अंकनावरून ही वीरगळ पायदळ लढाई निदर्शक वीरगळ आहे.
ह्याच भागातील अंकनामध्ये आपल्याला वीराच्या शरीरावरील आभूषणे स्पष्ट पहायला मिळतात, गळ्यात कंठा, कानात कुंडल, हातात कडा पायात वाळा अशी आभूषणे त्याने धारण केलेली असून, वीराची केशरचना सुद्धा विशिष्ट आहे. त्याच्या कमरेला गुडघ्यापर्यंत येणारे कटीवस्त्र असून त्यावर मेखला आहे. कटीवस्त्राचा घोळ वीराच्या दोन पायांच्या मध्ये दाखवलेला आहे .
त्यावरील कप्प्यात आपल्याला वीराचे स्वर्गारोहन पाहायला मिळते. स्वर्गातील ५ अप्सरा वीराला सोबत घेऊन स्वर्गलोकाकडे मार्गक्रमण करत असल्याचे दिसत आहे. विशेष म्हणजे या सर्वांचे अंकन अश्यापद्धतीचे केलेले आहे की अप्सरा वीराला घेऊन हवेतुन उडत चालल्याचे स्पष्ट कळते.
वीरगळीच्या वरच्या भागात आपल्याला वीर नमस्कार मुद्रेत पाटावर बसलेला दाखवलेला आहे त्याच्या मागे एक दासी हातात चवरी घेऊन उभी आहे, तर समोर वीराची इष्ट देवता म्हणजे नंदीच्या पाठीवर शिवलिंग दाखवले आहे . समोरच्या बाजूला पुजारी असून ते वीराकरावी पूजा करून घेत आहेत.
वीरगळीच्या सर्वात वरच्या भागात कलश कोरलेला असून युद्धात वीरमरण प्राप्त झालेल्या वीराला मोक्ष मिळाल्याची ती निशाणी आहे.
नौकादलाचा वीरगळ ( महाराष्ट्रातील एकमेव ) एकसार ( बोरिवली , मुंबई ):-
महाराष्ट्रातला अत्यंत अनोखा असा नौकायुद्धाचा प्रसंग कोरलेला आणि महाराष्ट्रातला एकमेव ( नौकायुद्धाचा प्रसंग कोरलेला ) शिल्पपट आहे.
बोरीवली मधील एकसार गावातील शिलाहार कालीन नौकादल निदर्शक वीरगळ .
वर निर्देशित दाखविल्याप्रमाणे वीरगळाच्या दुसऱ्या टप्प्यात शिवपिंड दिसून येते आणि संपूर्ण चित्रात वेगळी आणि उठावदार दिसणारी वस्तू म्हणजे त्या शिवपिंडीवर वाहिलेलं गुलाबी रंगाचे फूल ! वस्तुतः याच्या बाजुलाच एक अत्यंत सुंदर आणि लहानसं शिवमंदिर आहे .पण जुनं ते सोनं या हिशोबाने लोक आजही या वीरगळावरच्या शिवपिंडीला आस्थेने पुजतात .त्यामुळे आजही अज्ञान आणि आस्थेचा सुंदर मिलाफ बऱ्याचशा वीरगळांवरती दिसून येतो . म्हणूनच या लेखामध्ये मी वीरगळाचा प्रत्येक टप्पा आणि कप्पा उलगडून दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे .

एकसार गावातील वीरगळाचा सर्वात खालचा कप्पा (लढाई निर्देशक ).
सर्वसाधारणतः वीरगळाचा सर्वात खालचा टप्पा हा वीराच्या मृत्यूचं कारण दर्शवण्यासाठी असतो . यामध्ये विविध प्रकार असून त्याप्रमाणे वीरगळांचं वर्गीकरण केलं जातं. चित्र क्रमांक दोन मध्ये दाखवल्याप्रमाणे सदर वीरगळ हा नौका दलाच्या युद्धामध्ये आलेल्या वीराच्या वीरमरणाला दर्शवण्यासाठी उभारला गेला आहे . या सर्वात खालच्या कप्प्यामध्ये ३ नौका दिसून येतात. बारकाईने निरीक्षण केल्यास त्या शिडाच्या नौका होत्या हे दिसून येतं .सातवाहन काळामध्येच मोसमी वाऱ्यांचा शोध लागला होता आणि त्याचा वापर मुख्यत्वे व्यापारासाठी केला जात होता .सातवाहनांच्या नाण्यांवरती मिळालेलं जहाजाचं चित्र हे अधोरेखित करतं की अगदी तेव्हापासून आरमाराचं अस्तित्व भारतात होतं. शिडांव्यतिरिक्तही वल्ह्यांचा वापर नौकानयनासाठी केला जात असल्याचं दिसतं. मधल्या बोटीत बारकाईने लक्ष दिलं तर लढणारी माणस धनुष्यबाणाचा वापर करताना दिसतात तर काहीजण वल्ही मारताना दिसतात त्याचबरोबर नौकेच्या शेवटी एक माणूस सुकाणू धरून नौकेला दिशा दाखवताना स्पष्ट दिसून येतो आणि त्याला लागूनच असलेला दुसरा माणूस शिडाची दोरी सांभाळताना दिसतो. शिल्पकाराच्या कमी जागेत खच्चून जास्त शिल्प भरण्यामागचा उद्देश हा त्या घनघोर लढाईचं स्पष्ट शिल्पांकन व्हावं असा दिसतो. थोडक्यात ज्या वीराला मरण आलं ते ह्या नौका दलाच्या युद्धामध्ये आलं आणि ती लढाई बरीच घनघोर झाली असावी असं यातून आकलन होतं .
एकसार गावातील वीरगळाचा खालून दुसरा कप्पा ( स्वर्ग प्राप्ती निर्देशक )सर्वात खालच्या कप्प्यात लढाईचा प्रसंग घडल्यावर त्याच्या वरच्या कप्प्यात सहसा त्या वीराला स्वर्ग प्राप्ती झाली असं अभिप्रेत करणारे शिल्प कोरलं जातं. वीराचं शौर्य आणि पराक्रम या कप्प्यातून सहज दाखवलं जातं. चित्र क्रमांक तीन मध्ये मध्यभागी असलेली शिवपिंडी वीर शिवाचा उपासक असल्याचा दर्शवते. त्याच बरोबर वीरमरण आल्यामुळे त्याच्या स्वर्ग प्राप्तीचा प्रसंग दर्शवते. चित्र क्रमांक तीन मध्ये शिवपिंडीवर (उजवीकडे) वाहिलेल्या गुलाबी रंगाच्या फुला च्या बाजूला एक पुरोहित उभा दिसतो. उजव्या हातातल्या भस्माच्या पुरचुंडीतून तो शंकरावरती भस्मलेपन करत असल्याचं दिसतं. पुरोहिताच्या मागे असलेल्या अप्सरा या सितार / वीणा सदृश्य तंतुवाद्य घेऊन गायन वादन करताना दिसतात. त्याच सोबत अप्सरांच्या वरती पुरोहिताचे काही शिष्यगण हे मंत्रोच्चारण करताना दिसतात . शिवपिंडीच्या दुसऱ्या बाजूला (डावीकडे) वीरगती प्राप्त झालेला वीर ( शिल्प भग्नावस्थेत ) चौरंगावर बसलेला दिसून येतो. पुरोहित त्या वीराला वेदमंत्र सांगतात

एकसार गावातील वीरगळाचा खालून तिसरा कप्पा (स्वर्गरोहण )
वेदमंत्रांनी संपन्न झालेल्या शिव पूजनानंतर स्वर्गप्राप्ती झालेल्या वीराला अप्सरा स्वर्गात घेऊन जातात. चित्र क्रमांक चार मध्ये मधोमध वीर चौरंगावर बसलेला आढळतो ( वीराची मूर्ती पूर्ण भग्नावस्थेत ). त्याच्या आजूबाजूला चवऱ्या ढाळत उभ्या असलेल्या अप्सरा त्याच्या स्वर्गरोहणाची स्थिती दर्शवतात. वीराचा वेगळा कप्पा हा त्याने गाजवलेल्या अतुलनीय पराक्रमाचं द्योतक असतं. बऱ्याचदा अप्सरा वीराला खांद्यावर उचलून नेताना दाखवतात किंवा या शिल्पाप्रमाणे त्याच्यासाठी विशेष यानाची व्यवस्था केली जाते.

एकसार गावातील वीरगळावरील कलश (मोक्षप्राप्ती ).
वीरगळावरचा कलश मांगल्यासोबतच मोक्षप्राप्तीचंही प्रतिक आहे. कलश अत्यंत सुबकपणे कोरलेला आहे .त्यावरती श्रीफळ ( नारळ ) शोभून दिसतं . श्रीफळाभोवती यक्षिणी फेर धरून नाचताना दिसतात . कलशाचं भव्य आकारमान आणि सौंदर्य , सुबकता हे एका राजाचं वीरगळ असल्यांचं दर्शवतात. कारण इतकं भव्य, सुबक आणि सुरेख शिल्प कोरणाऱ्या शिल्पकाराला उत्तम मानधन द्यावं लागे आणि त्यासाठी राजा किंवा त्याचं राजघराणंच समर्थ असे.
सर्वसाधारणतः कोणत्याही वीरगळावर ब्राम्ही किंवा तत्सम लिपीतला शिलालेख उपलब्ध नसतो. त्यामुळे त्यामागचा अचूक इतिहास हा छातीठोकपणे सांगता येत नाही. परंतू इतिहासकारांच्या मते एकसार येथील वीरगळाबाबत दोन मतप्रवाह आहेत. प्रसिद्ध तत्त्ववेत्ता हेन्री कझिंन यांच्या मते शेवटचा शिलाहार राजा सोमेश्वर आणि देवगिरीचा राजा महादेव यादव यांच्यात तेराव्या शतकात झालेल्या घनघोर युद्धात वीरमरण पावलेल्या सोमेश्वराचे हे शिल्पचित्रण आहे. तर डॉ. शिल त्रिपाठी यांच्या मते हे स्मारक गुजरातच्या परमार भोज राजा याच्या कोकण विजयाचे प्रतीक आहे. व इ.स. १०२० साली साष्टी येथील नौकादल निदर्शक वीरगळ जमीन एका ब्राम्हणाला दान दिली, असा निष्कर्ष काढला आहे.
पुणे परिसरातील वीरगळ :-
गणपती आणि वीरगळ
पुण्यातल्या धाकला शेखसला दर्याच्या बाहेर दोन वीरगळ भिंतीला टेकून उभे आहेत, यापैकी एक बीरगळ चारही बाजूंनी कोरलेला आहे. एका बाजूला आराध्य देवताच्या ठिकाणी गणपतीची मूर्ती आहे. हा वीरगळ भितीत घातल्यामुळे आज ही मूर्ती पूर्ण दिसत नाही.
नेहमी शिवलिंग पाहायला मिळतं, तिथे गणपतीची मूर्ती असल्याने त्या वीराचा आराध्य देव गणपती असावा, असा अंदाज बांधता येतो. या वीरगळाची उंची ५० इंच आणि रुंदी १४ इंच आहे. तिथलाच दुसरा वीरगळ तीन कप्प्यांचा असून त्यावर सतत रंग, तेल ओतल्यामुळे उठावपणा कमी होऊन तो खराब झाला आहे. त्याची उंची ४४ इंच व रुंदी १२ इंच आहे.
असाच चारही बाजूंनी कोरलेला एक वीरगळ शनिवारवाड्याजवळ, सूर्या हॉस्पिटलच्या मागच्या बाजूला बाळोबा मुंजा नावाच्या देवस्थानात आहे. बाळोबा मुंजा हे पेशवाईतलं महत्त्वाचं देवस्थान होतं. बाळोबा मुंजा नावाच्या माणसाने या परिसराचं रक्षण करताना स्वतःचा देह ठेवल्यावर त्याचं स्मरण म्हणून इथे एक वीरगळ उभारला गेला. हा वीरगळही चारही बाजूंनी कोरलेला आहे. त्यापैकी दोन बाजूंवर गणपतीचं शिल्प अतिशय स्पष्ट आहे, तर उरलेल्या दोन बाजूंवर शिवलिंगाची पूजा दाखवली आहे. त्यामुळे ही व्यक्तीसुद्धा गणपतीची भक्त असावी हे लक्षात येतं. एकंदरीत, शैलीवरून या वीरगळाचा काळ अंदाजे बाराव्या शतकाच्या आसपासचा असावा. याव्यतिरिक्त इथे तुटलेल्या अवस्थेतला आणखी एक वीरगळही आहे.

पुण्यातील नागेश्वर या प्राचीन मंदिराच्या परिसरात गणपतीचं अंकन असणारा स्मृतिस्तंभ आहे. या शिलास्तंभाच्या वरचा भाग हा गतिकार असून त्याच्या एका बाजूला गणपतीचं शिल्प आहे व उजव्या डाव्या बाजूला चंद्र व सूर्याचं अंकन आहे. त्याची उंची २७इंच आहे. या स्मृतिशिळेजवळच आणखी एक अशाच प्रकारची स्मृतिशिळा असून त्यावर कोणत्याही प्रकारचं शिल्प नाही.

पाषाण परिसरातील सोमेश्वरवाडीमध्ये सोमेश्वर या शिवमंदिराच्या प्रांगणातसुद्धा चारही बाजूंनी कोरलेला वीरगळ आहे. तिथेही दोन बाजूंवर गणपतीचं शिल्प आणि दोन बाजूंवर शिवलिंगाची पूजा आराध्य दैवताच्या ठिकाणी पाहायला मिळते. या वीरगळावरचा गणपती झिजल्यामुळे स्पष्ट दिसत नाही. या मंदिरातल्या इतर वीरगळांबाबत पुढे माहिती घेऊच. पण हे वीरगळ गणपती या देवतेची लोकप्रियता किती झपाट्याने वाढत होती हे दर्शवतात. पुणे आणि परिसरातच असे वीरगळ प्रामुख्याने पाहायला मिळतात. पुढे पेशवाई काळात पुण्यात गणपतीचं महत्त्व वाढत जाऊन अनेक गणपती मंदिरांची स्थापना तर झालीच, त्याचबरोबर गणपती उत्सवाची सुरुवातही याच पुण्यातून झाली यात नवल नाही.

पाषाण परिसरातील सोमेश्वरवाडीमध्ये सोमेश्वर या शिवमंदिराच्या प्रांगणात चारही बाजूंनी कोरलेला वीरगळ आहे.

पशुपालकांचे वीरगळ
राष्ट्रकूट राजा कृष्ण याच्या इ. स. ७६८ मधील ताम्रपटात पुण्याजवळच्या भोसरी गावाचा उल्लेख आढळतो. मूळचे भोजापूर ते आजचं औद्योगिक कंपन्यांनी गजबजलेलं भोसरी असा या गावाचा प्रवास आहे. या गावात तीन शिलाप्रकोष्ठ (मोठे शिळा खंड) आणि दोन शिलास्तंभ (दगडी खांबासारखी रचना) असल्याचा उल्लेख आढळतो. या परिसराच्या आसपास लोहयुगात काही भटक्या जमाती बावरत असाव्यात असा निष्कर्ष महापाषाणकालीन शिलावर्तुळांच्या पुराव्यावरून काढता येतो. ही स्मारकं भोसरी इथे असल्याचा शोध डॉ. ह. घि. सांकलिया यांनी लावला, डेक्कन कॉलेजतर्फे या अवशेषांचं अन्वेषण झाल्याबर असा निष्कर्ष काढण्यात आला, की हे अवशेष प्रत्यक्ष दफनाचे निदर्शक नसावेत, परंतु या रचना मृतांचं स्मारक म्हणून उभ्या केल्या असाव्यात, सध्या भोसरीचे रहिवासी या शिलाप्रकोष्ठात शेंदूर लावून ठेवलेल्या दगडाची चेडोबा या नावाने पूजा करतात. आजही कुरुंघर (कुरुबा) ही धनगर जमात अशा पद्धतीने मृतांना पुरून तिथे शेंदूर लावलेला गोल दगड ठेवून त्याची पूजा करते. महाराष्ट्रातील आणखीही काही जमातींत अशा महापाषाणीय दफन पद्धती आणि प्रथा आढळतात. ही मोठी सूचक गोष्ट आहे. भोसरीचे सर्वच महापाषाणीय अवशेष शिळावर्तुळाच्या स्वरूपाचे आहेत असं मात्र नाही. यांतील एक बहुकोनी असून, दुसऱ्या गोलाचा व्यास दोन मीटर आहे. शिलाप्रकोष्ठ जवळजवळ पाऊण मीटर रुंदीचं व तितक्याच उंचीचं असून सुमारे अर्धा मीटर खोलीचं आहे. शिलास्तंभ दीड ते अडीच मीटर उंचीचे असून, या शिळांचा परीघ सुमारे एक मीटर इतका आहे.
भोसरी इथे भैरवाच्या मंदिरातील वीरगळावरचा मृत वीर गाईगुरांच्या संरक्षणासाठी मरण पावल्याचं दिसतं. सांकलिया व शां. भा. देव यांच्या मते या परिसरात कुरुवा धनगरांच्या टोळ्यांचा बाबर होता, याला यातून पुष्टी मिळते. मोशी आणि भोसरी या दोन गावांच्या दरम्यान माळावर एक ठिकाण असून तिथे कलावंतीण महालमता नावाच्या देवीचं लहानसे मंदिर आहे. स्थलांतर करणारे धनगर आज या मंदिर परिसरात मोठ्या प्रमाणावर येतात या मंदिराचा आणि धनगरांचा पूर्वापार संबंध आहे, असे स्थानिक सांगतात, भोसरी आणि परिसरात आजही धनगरांच्या प्रवासी मार्गावर त्यांच्या दैवतांची लहान लहान ठाणी आहेत.

भोसरी येथील भैरवनाथ मंदिरातील वीरगळ
भारत इतिहास संशोधन मंडळाच्या १९१९ च्या एका त्रैमासिकात पुढीलप्रमाणे माहिती आली आहे 'पाषाण- पुण्याहून २।। कोस सोमेश्वर महादेवाचं मंदिर आहे. मंदिराखाली लहानसा ओढा आहे. त्याज चक्रतीर्थ म्हणून पाण्याची १-२ कुंड आहेत. ती दगडांनी बांधलेली आहेत. जवळच घाट आहे. नेहमी ऐकण्यात येणारी महादेवाच्या प्रकटीकरणाची पुढील गोष्ट इथल्याही महादेवासंबंधी सांगण्यात येते, एका गुराख्याच्या गाईंपैकी एक गाय एका वारुळावर रोज आपल्या सडांतून दुधाची धार सोडत असे. एकदा गुराख्याने ते पाहिलं, महादेव त्याच्या स्वप्नात गेला, गुराख्याने गावच्या लोकांच्या मदतीने वारूळ खणून महादेव बाहेर काढला व लहानसे देऊळ बांधलं, लोक म्हणतात, राजमाता जिजाबाईसाहेब यांनी हे देऊळ बांधलं, पुणे ग्याझिटियरकार म्हणतो, 'येसूबाईसाहेबांनी बांधलं', देऊळ मजबूत, चौकोनी दगड-विटांचं आहे. शके १७०२ च्या सुमारास शिवरामभाऊ नावाच्या गृहस्थाने नवीन सभामंडप बांधला असं सांगतात.'
या वीरगळावर गणपतीचं शिल्प आहे. हा एकमेव वीरगळ सोडता या परिसरात दुसरा कुठलाही वीरगळ नाही परंतु या मंदिराच्या शेजारी जमिनीपासून वीसेक फुटांखाली पाणी वाहून जाणारा एक भुयारी नाला आहे. त्याच्या दोन्ही बाजूस दगडी बांधकाम असून त्याच्यावर फरश्या आहेत. या नाल्यात नगरपालिकेचे स्वच्छता कर्मचारी साफसफाईसाठी लोखंडी शिडीच्या मदतीने उतरतात. हा नाला मंदिरामागच्या राम नदीला जमिनीखालूनच जोडलेला आहे. हा नाला पूर्व-पश्चिम आहे. यात पूर्वेला वीसेक फुटांवर नाल्याच्या छताला दोन अगदी कोरीव वीरगळ लावलेले आहेत. चार कप्प्यांच्या त्या लांब वीरगळांची उंची साडेतीन ते चार फूट असावी. त्यातील एका वीरगळावर गाईगुरांचं शिल्प आहे. म्हणजेच हा वीर गाईगुरांसाठी झालेल्या लढाईत मरण पावला होता हे कळतं. बहुतांश खेडेगावांमध्ये त्या मंदिराबाहेरील वीरगळांवरील गाईगुरांचं आणि शिवलिंगाचं शिल्प बघून मंदिराच्या निर्मितीकथेला गुराखी आणि शंकराच्या कथेची जोड दिली जाते. सोमेश्वर मंदिर हे पाषाण गावापासून बाहेर माळावर आहे. या परिसरात पशुपालकांचा वावर असणं साहजिक होतं.

सोमेश्वर मंदिराच्या खाली असणाऱ्या भुयारी नाल्यातील वीरगळ
हा रस्ता पुढे बाणेरच्या लेण्यांकडे जातो. बाणेरच्या बनेश्वर मंदिरात म्हणजेच तुकाई टेकडीच्या पायथ्याच्या लेण्यांमध्ये एकूण सहा वीरगळ आहेत. या परिसरात वीरगळांची मोठ्या प्रमाणात चोरी झाल्यामुळे ते एका कोनाड्यात काचेमध्ये बंदिस्त करून टाकले गेले आहेत.
त्यातील दोन वीरगळ उंचीला साधारण पाच-पावणेपाच फुटांचे आहेत. सहांपैकी तीन वीरगळ हे तीन कप्प्यांचे, तर तीन वीरगळ चार कप्प्यांचे असून ते पशुपालकांचे आहेत. काचेमध्ये बंदिस्त असल्यामुळे या वीरगळांच्या निरीक्षणात अडचणी येतात. या वीरगळांचा दगड काळापाषाणी नसल्यामुळे त्यातील शिल्पही फारशी उठावदार नाहीत. बहुतांश वेळा प्रवासी मार्गावर असणारे वीरगळ पशुपालकांचे असतात, या गुंथर सोंथायमरच्या मताला या दोन्ही ठिकाणी आधार मिळतो.
बाणेरजवळचं महामार्गावरचं गाव म्हणजे बावधन. या गावातील भैरवनाथ मंदिराच्या परिसरात एकूण पाच वीरगळ असून त्यातील दोन वीरगळ पशुपालकांचे आहेत. यातील फक्त एकच वीरगळ चांगल्या अवस्थेत आहे.

बावधन आणि सांगवी गावातील वीरगळ
बाणेर-पाषाणकडून पुण्याला जाणाऱ्या रस्त्याला सांगवीतून एक रस्ता येऊन मिळतो. इथे पवना नदी मुळा नदीला मिळते. या नदीच्या संगमावर संगमेश्वर नावाचं एक लहानसं शिवमंदिर आहे आणि त्याच्यासमोर एका झाडाला टेकून भंगलेल्या अवस्थेत एक वीरगळ आहे. हा वीरगळही पशुपालकांच्या लढाईमधल्या वीराच्या स्मरणार्थ उभारलेला आहे. या वीरगळाची रचना पाहता हा यादव काळातील असावा. गुंथर सोंथायमरने यादवकालीन वीरगळाच्या दिलेल्या नमुन्यांमध्ये आणि या वीरगळांमध्ये कमालीचं साम्य आहे. हा परिसर मूळ गावठाणापासून लांब आहे, नदीकाठी आहे. विशेष म्हणजे हा वीरगळ चार कप्प्यांचा असून त्यात आणि बाणेरच्या लेण्यांमधील वीरगळांमधे कमालीचं साम्य आहे.
पशुपालकांचा प्रवासी मार्ग आणि वीरगळ
गुंथर सोंथायमर यांनी महाराष्ट्रातील, विशेषतः पश्चिम महाराष्ट्रातील वीरगळांवर बरंच काम करून ठेवलं आहे. त्यात प्रामुख्याने पुणे आणि आसपासच्या भागाचा भौगोलिक, सांस्कृतिक अभ्यास करून त्यांनी काही मतं मांडली आहेत. सोंथायमर यांच्या मते 'दुष्काळी भागातील काही जुन्या गावांमध्ये किंवा वाड्या-वस्त्यांमध्ये हे पशुपालकांचे वीरगळ असल्याचं दिसतं. म्हणजेच भीमा, कहा, नीरा आणि माणच्या खोऱ्यात. या भागांतील मौखिक परंपरा आणि ऐतिहासिक सीतांमध्ये इत्याखेत जीवनार्थ प्रतिबिंब पडल्याचं दिसतं वीरांची निर्मिती का झाली हे गावकरी विसरले असले तरी त्यांच्या ग्रामीण मौखिक परंपरा कायम आहेत आणि ते पुरेसे पुरावे आहेत. (उदा. सातारच्या शाहु महाराजांच्या दप्तरातील नोंदीमध्ये साताऱ्याच्या पूर्वेकडील भागातील प्रमुख धनगर नायकांचा उल्लेख आहे या परिसरात गुरांवर छापे मारण्याची प्रथा होती, त्यांच्याशी पशुपालक कायमর लढा देत आले होते.
यासाठी गुंथर काही उदाहरणं देतात. पुण्याजवळ उदाहरण म्हणजे चोराची आळंदी या गावाचं आता हे गाव म्हातोबाची आळंदी म्हणून प्रसिद्ध आहे. तळेगाव ( दाभाडे ) इवे सापडलेल्या ताम्रपटात राष्ट्रकूट राजा कृष्ण (पहिला) याच्या काळातील पुण्याचा उल्लेख आला आहे. तसा अलेंटिय (चोराची आळंदी) या गावाचा उद्देख आला आहे. पुण्यापासून हे गाव ३० किमीवर आहे. विशेष म्हणजे इथला परालकांनी स्थापन केलेला देव म्हातोबा हाच पुण्यातील कोथरूडचा ग्रामदेव आहे. गुंथर या गावाविषयी म्हणतात, की 'चोराची आळंदी गावात जुन्या उद्ध्वस्त करनीच्या टोकाला महादेव मंदिराबाहेर तीन सुंदर मीठे वीरगळ आणि पशुपालक गवळी जे म्हातोबाची (म्हसोबा) पूजा करणारे आहेत. तो देव आज गावातील सर्वांत महत्वाचा देव झाला आहे.
गावातील हे वीरगळ पशुपालक वीरांच्या लढाईचं स्मरण ठेवण्यासाठीच उभारले आहेत. या गावातील डोंगरावर गवळेश्वराचं मंदिर आहे, जे एके काळी पशुपालक गवळ्याच्या इथल्या वास्तव्यादरम्यान उभारलं गेलं. या परिसरात पालकांच्या बळांचं प्रमाण सर्वाधिक आहे. याचं कारण देताना गुंथर म्हणतात, की 'जरी राष्ट्रकूटाच्या ताम्रपटात स्थिर वस्तीचे उल्लेख असले, तरी पुण्याच्या पूर्वेकडे विशेषतः नदीच्या काठाजवळ नियमित तीचा विस्तार, ही एक स्थिर जीवनाची प्रक्रिया होती. त्याची गती प्रत्यक्षात स्वातंत्र्योतर घडामोडींच्या काळातच वाढली आणि पूर्णत्वास आली. पुण्याच्या पूर्वेकडील भागात दुष्काळी भाग होता. पारंपरिकपणे खेडूत जिये शेती करत ती बाजरी पिकवणारी जमीन होती. मुळा नदीकाठावरची कोरेगावसारखी गावं मूलतः पशुपालन अर्थव्यवस्थेवर आधारित राहिली होती. या गावातील महादेव मंदिराच्या जवळचे वीरगळ हे गुरांचं रक्षण करताना किंवा लुबाडलेली गुरं पुन्हा मिळवताना झालेल्या लढाईत मारले गेलेले किंवा गुरांच्या हल्ल्याचं चित्रण करणारे आहेत. नजीकच्या नायगाव पेठमधील वीरगळांवर गुरांचं चित्रण आहे, परंतु त्यात अप्सरा दाखवलेल्या नाहीत.
पुणे शहराचं स्थान घाटावरून पठारी भागात जाणाऱ्या पशुपालकांच्या आणि प्रवासी मार्गावर आहे.

पुण्याहून सोलापूर, दौंड भागाकडे जाणाऱ्या रस्त्यावर म्हातोबाची आळंदी येथील महादेव मंदिराच्या आवारातील वीरगळ
-
काही वर्षांपर्यंत पशुपालन हा मुख्य व्यवसाय होता. या परिसरात पावसाचं प्रमाण कमी असल्यामुळे इथे धनगर-गवळ्यांची संख्या अधिक आहे, तर सह्याद्रीच्या कोकणात उतरणाऱ्या पुण्याजवळच्या घाटमार्गावरही गवळी-धनगरांची संख्या लक्षणीय आहे. पुण्याला पाणीपुरवठा करणाऱ्या खडकवासला धरणाजवळचा बहुतांश प्रदेश आता सैन्याच्या ताब्यात आहे. या परिसरात डोंगराळ भागात पशुपालकांची संख्या मोठी होती. डॉ. डी. डी. कोसंबी यांनी नोंदवलं आहे,

'पुण्याजवळील खडकवासला इथल्या राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीतील वस्तुसंग्रहालयात वीरांचं स्मारक असलेल्या दगडांचा चांगला संग्रह आहे'.
पशुपालक आणि वीरगळ यांचा अभ्यास करताना तो तो भूप्रदेशही महत्त्वाचा असतो हे संशोधक डॉ. अजय दांडेकर यांनी एका लेखात मांडलं आहे. दांडेकर म्हणतात, "विशिष्ट भूप्रदेशांचं मानव सभ्यतेतील योगदान दुर्लक्षिलं गेलं आहे. असंच दख्खनवरील पशुपालक समाजाबाबत घडलं आहे. एरवी दख्खन पठारावरील व्यापक भूप्रदेश व्यापणाऱ्या या समुदायाला आजवरच्या इतिहासलेखनात एक परिशिष्ट म्हणूनच स्थान मिळालं आहे. दख्खनच्या पठाराचा अभ्यास करताना लक्षात येतं, की पश्चिमेला उष्ण कटिबंधीय सदाहरित वनराई, उत्तरेला व दक्षिणेला अनुक्रमे गोदावरी खोऱ्याचा ऊर्ध्व भाग, दक्षिणेला कृष्णा खोऱ्याच्या उतरतीचा भाग व पूर्वेकडे भातशेतीचा पट्टा यांनी हा प्रदेश सीमांकित आहे. नदी खोऱ्यांना जोडणारे दळणवळणाचे सर्व महत्त्वपूर्ण मार्ग या प्रदेशातून जातात. सह्याद्रीच्या पर्जन्यछायेतील हा प्रदेश गेली दोन सहस्रकं पशुपालक जीवनपद्धती व दख्खन पठारावरील सामाजिक व राजकीय घडामोडींचा स्रोत राहिला आहे. दख्खन पठारावरील पशुपालकांच्या जीवनपद्धतीचा विस्तार पडताळून घेण्याचा अन्य एक मार्ग म्हणजे या प्रदेशात सापडणाऱ्या वीरगळांचे पुरावे."
पशुपालन, पशुपालकांवर होणारे हल्ले आणि त्यातून तयार झालेल्या वीरगळांचा अभ्यास करताना भूगोलासोबत हवामानाचा अभ्यासही महत्त्वाचा ठरतो. त्याबाबत दांडेकर म्हणतात, "एकतर, गुरं लुबाडण्यासारख्या घडामोडी पर्जन्यछायेच्या प्रदेशात अधिक घडत असत. दुसरं, गोदावरी, कृष्णा व भीमेच्या तथाकथित 'केंद्रीय विभागा'त गुरांसंबंधी एकही वीरगळ आढळून येत नाही. त्याचप्रमाणे कोकण किनारपट्टीतही या प्रकारचा एकही पुरावा आढळत नाही. म्हणजेच गुरांसाठी झालेले हल्ले रेखांकित करणारे वीरगळ फक्त एका विशिष्ट भूभागातच आढळतात, तो म्हणजे पर्जन्यछायेचा पठारी प्रदेश. तिसरी गोष्ट अशी, की वेगवेगळ्या राजवटींनी दिलेल्या जमिनींच्या दानपत्रांचा अभ्यास केला तर असं आढळून येतं, की नदी खोऱ्यांच्या तथाकथित केंद्रीय प्रदेशातील दान केलेल्या जमिनींचं प्रमाण हे पर्जन्यछायेतील दान केलेल्या जमिनींच्या प्रमाणापेक्षा खूप अधिक आहे.
पुण्यातून सिंहगडला जाणाऱ्या रस्त्यावर धायरी गाव लागतं. इथे गावठाणाच्या दक्षिणेला जैतुबाबा समाधी स्थळ आहे. या समाधिस्थळाला चारही बाजूंनी कुंपण असून आत अनेक लहान लहान समाधी मंदिरं आहेत. प्रत्यक्षात ही दफनभूमी आहे. या ठिकाणी एका कोपऱ्यावर भिंतीला लागून एकूण सात वीरगळ भंगलेल्या अवस्थेत उभे आहेत. त्यातील एकच वीरगळ चांगल्या अवस्थेत आहे. यातील दोन वीरगळांमध्ये मृत वीर सर्वांत खाली पडलेल्या अवस्थेत दाखवला आहे, हे विशेष आहे. दोन वीरगळांमध्ये घोडदळाच्या लढाईचा देखावा दिसतो. याशिवाय इथे एक मध्ययुगीन वैशिष्ट्यपूर्ण स्मृतिशिळा आहे. यात वीरांनी मराठाकालीन पगड्या घातल्या असून त्यांच्या हातात लहानशी तलवार आणि ढाल दाखवली आहे. याशिवाय इथे एक सतीशिळाही आहे.

कोरेगाव मुळा या गावातील महादेव मंदिराच्या बांधकामात वापरलेले वीरगळ
कोथरूड गावठाणाच्या बाहेर मुंबई-बेंगळुरू महामार्गाजवळ झाकोबा हे एक यक्षाचं मंदिर आहे. मंदिर आणि आतील मूर्ती मध्ययुगीन असून नंतर त्यांचा जीर्णोद्धार झाला असावा असं वाटतं. मावळातील अनेक गावांच्या ग्रामदेवता या जखुबाई म्हणजे यक्षिणी आहेत, याशिवाय त्यांच्या देवरायाही आहेत. त्यामुळे या परिसरातले लोक आजही यक्षपूजा करताना दिसतात. अनेक साहित्यात मृतांचे यक्षवीर झाल्याचे संदर्भ मिळतात. झाकोबाचं स्थान अशाच यक्षवीराचं असावं असं वाटतं. कारण या मंदिरातील मूर्ती घोड्यावर बसलेल्या, हातात तलवार घेतलेल्या वीराची मध्ययुगीन स्मारकशिळा आहे. याशिवाय मंदिराबाहेर दोन स्मारकशिळा असून त्यातील एकावर पती-पत्नी घोड्यावर बसले आहेत असं दाखवलं आहे, तर दुसऱ्या प्रकारची शिळा गोवत्स स्मारकासारखी आहे. त्याची झीज झाल्यामुळे त्याबद्दल नक्की सांगता येत नाही.
उत्तरेकडून बापखेल येरवडा मार्गाच्या बाजूने येणाऱ्या दोन मोठ्या रस्त्यांच्या वर तारकेश्वरच्या लेण्या आहेत. या लेण्यांचा वापर प्रवासी, व्यापारी, बौद्ध भिक्षुक, योगी निवाऱ्यासाठी करत असत. या लेण्यांच्या बाहेर चार मध्ययुगीन स्मारकशिळा आणि एक तुटलेला वीरगळ आहे.

भारत इतिहास संशोधन मंडळाच्या संग्रहात पुण्यातील काही वीरगळ आहेत. त्यात दोन फुटके वीरगळ आणि दोन चांगले राहिलेले वीरगळ आहेत. त्यापैकी एका वीरगळामध्ये अप्सरांचा कप्पाच नाहीय, तर दोन वीरगळांमध्ये सर्वांत खालच्या कप्प्यात अप्सरा आहेत. हे वैशिष्ट्यपूर्ण आहे. यातील कुठले वीरगळ कुठे सापडले याची माहिती वीरगळाच्या खाली किंवा बाजूला नोंदवून न ठेवल्यामुळे आज मंडळातील कोणता वीरगळ कुठे सापडला हे सांगता येत नाही.
यातील एक वीरगळ चारही बाजूंनी कोरलेला असून याच्या समोरच्या बाजूला अप्सरांचा कप्पा नसला तरी बाजूच्या भागात तो दाखवला आहे. हे वीरगळ फारसे कोरीव नसून ओबडधोबड कोरलेले आहेत.

धायरी गावठाणच्या दक्षिणेला जैतुबाबा समाधीस्थळ आहे. या समाधी स्थळाला चारही बाजूने कुंपण केलं असून आत अनेक समाधी मंदिरं आहेत.

कोथरूड गावठाणातील झाकोबा यक्षमंदिर आणि तेथील वीरगळ
याशिवाय वीरगळाचाच पुढील अवतार असणाऱ्या मध्ययुगीन स्मारकशिळा पुण्यात असंख्य आहेत. पिंपळे निलखमध्ये नदीकाठच्या महादेव मंदिरात पतिपत्नी असलेली आणि घुमटी प्रकारातील स्मारकशिळा आहे. बाणेरच्या भैरवनाथ मंदिराबाहेरील अशाच स्मारकशिळांना देवाचे सैनिक समजून रक्तमांसाचा नैवेद्य दिला जातो. चतुःशृंगी, ताथवडे, बाणेर, किवळे, थेरगाव, पिंपळे निलख, धायरी या ठिकाणी असणाऱ्या स्मृतिशाळा चौरस्त्यावर आहेत. प्राचीन काळापासून आपल्याकडे चौरस्ता आणि तिकाटण्यावर मृत पूर्वजांना नैवद्य देण्याची पद्धत आहे. विशेष म्हणजे या सर्व ठिकाणी स्मारकशिळांना नैवद्य दिला जातो. दसऱ्याला त्यांना शेंदूर लावला जातो. पुण्यात महापाषाण काळापासून ते मध्ययुगापर्यंत वीरगळाच्या उभारणीत अनेक स्थित्यंतरं पाहायला मिळतात. उत्तर मध्ययुगात मृत वीरांची स्मारकं उभारण्याऐवजी फारसं कोरीवकाम नसलेल्या स्मारकशिळा उभारण्यात आल्या. पुणे महानगरातील सर्वच गावांत वीरगळ नाहीत. महत्त्वाच्या काही गावांमध्ये थोडेफार वीरगळ शिल्लक आहेत. असं असलं तरी इतकी वर्ष दुर्लक्षित असलेल्या या वीरगळांमधून पुण्याचा गतकाळ उभा राहतो. ही शिल्पं मूक असली तरी त्यांना बोलतं करून स्थानिक इतिहास धुंडाळता येतो. पुण्याच्या शहरीकरणात अजूनही काही वीरगळ कुठे ना कुठे भग्न अवस्थेत शिल्लक असतील.
युद्धात धारातीर्थी पडलेल्या किंवा परकीय आक्रमणापासून गावचे रक्षण करताना हुतात्मा झालेल्यांचे स्मारक म्हणजे वीरगळ. पण आज त्यांची ओळख हरवली आहे. ते कुठेतरी महादेवाचे मंदिर , ग्रामदैवत किंवा गावकुसाबाहेरील दुर्लक्षित व भग्न अवस्थेत दिसतात. काही ठिकाणी तर देवाचे दगड म्हणून पूजले जातात. बहुतांश वीरगळांना शेंदूर फासल्याने त्याची झीज होते. सतीशिळा आणि गद्देगळ यांचीही तीच अवस्था. अज्ञात वीरांच्या स्मारकांची ही अवस्था म्हणजे त्यांच्या बलिदानाचा अपमान !
वीरगळांची अवस्था खूप वाईट आहे. आपण त्यांचे संवर्धन केले पाहिजे. वीरगळांना शेंदूर किंवा रंग थापू नये, यासाठी गावकऱ्यांमध्ये जनजागृती करावी. अस्ताव्यस्त पडलेल्या वीरगळ त्यांना ऊन वारा पाऊस लागणार नाही , अशा ठिकाणी ठेवाव्यात . त्यामुळे त्यांची झीज थांबेल. जमल्यास वीरगळबाबत माहिती देणारा बोर्ड तिथे लावावा. पुरातत्व खात्याकडे वीरगळ नोंदणीचे फॉर्म मिळतात. त्यामार्फत वीरगळ नोंदणी करावी. वीरगळांची अशी उपेक्षा थांबली पाहिजे. त्यांना त्यांची हरवलेली ओळख मिळवून देणे, त्याबाबत जनजागृती करणे ही आपली जबाबदारी आहे. इतिहासप्रेमी म्हणून वीरगळ संवर्धनासाठी नेहमी प्रयत्नशील असावे.
आपली संस्कृती राखणाऱ्या वीरांना मानवंदना म्हणून एवढेतरी आपण करूच शकतो !!!
पुसदचा वीरगळ
![]() |
| कीर्तीमुख |
असाच एकदा ओंकारेश्वरला जाण्याचा योग आला.बारा ज्योतिर्लिंगापैकी एक ज्योतिर्लिंग क्षेत्र आहे ओंकारेश्वर. पुण्यसलिला नर्मदेच्या काठावर वसलेलं ओंकारेश्वर मध्यप्रदेशात येतं.मी माझ्या अन्य तीन मित्रांसह तिथे गेलो होतो.तिथे गेल्यावर आम्हाला कळलं की तिथं नर्मदेच्या उत्तर तीरावर एक ओंकारेश्वराचं व दक्षिण तीरावर एक ममलेश्वराचं अशी दोन शिवालयं आहेत.आम्ही दक्षिण काठावर होतो त्यामुळे उत्तर तीरावरील मंदिराला जाण्यासाठी बोटीने जावं लागेल हे स्पष्टच होतं. जिथे गाडी पार्किंग होतं तिथंच एका व्यक्तिने एका बोटवाल्या मुलाला आवाज देऊन बोलावलं व त्याला आम्हाला उत्तर तीरावर जायचंय हे सांगितलं.आम्ही चौघे-पाचजण असूत.थोडंफार बोटीच्या
भाड्याविषयी घासघीस झाली असेल/नसेल व आम्ही त्याच्या बोटीने जायचं नक्की केलं.अठरा-एकोणवीस वर्षांचा सुदृढ तरूण पोरगा होता आमचा नावाडी. घाटाच्या पायऱ्या उतरून खाली आलो व त्याच्या बोटीत बसलो.ती मोटारबोट होती.नर्मदा मला कायमच भुरळ पाडते.आद्य शंकराचार्यांनी लिहीलेल्या नर्मदाष्टकाची,नर्मदा नदी बघुन मला आठवण येते.नदी काठचा उंचच उंच दगडी किनारा व त्या दगडांचे स्पष्टपणे दिसून येणारे स्तर बघण्यात मी चांगलाच गुंगलो होतो.आमची बोट नदीपात्राच्या मध्यभागी आली.पाण्याचा हिरवट काळसर रंग तिथं नदीपात्राची खोली खुप जास्त असावी हे स्पष्ट जाणवून देत होता.मी सहज माझ्या नावाड्याला नदी पात्राची खोली किती आहे
हे विचारलं. तर तो पोरगा मला म्हटला की ‘मैय्या यहां पाचंसौ फिट गहरी बहती है’.नर्मदातटीच्या या लोकांचं भावविश्व नदीभोवती इतकं छान गुंफलंय की ती लोक नदीला आईच समजतात.मला त्याचं नर्मदेला मैय्या म्हणणं खुपच भावलं.परंतू नदी पाचशे फुट खोल असेल याबद्दल त्याचं मत नदीचं तुलनात्मक अरूंद पात्र बघता फारसं पटत नव्हतं.पण मग नदीपात्राची खोली सांगणारा अन्य कोणताही माहितीस्त्रोत तिथं नव्हता.त्या नावाड्याचा जन्मापासून सगळा जीवनकाळ नर्मदेवरच गेला आहे त्यामुळे त्याने सांगितलेल्या माहितीवर विश्वास ठेवायला काही हरकत नव्हती.आणि तसंही मी तिथे ज्योतिर्लिंगाचं दर्शन घ्यायला आलो होतो,नदीपात्राची
लांबी,रूंदी,खोली माहिती करून घ्यायला नाही, त्यामुळे मी तो विषय तिथंच थांबवुन नावाड्याला त्याचं नाव वय शिक्षण इ विचारलं.त्याचं वय अठरा-एकोणवीस वर्ष काय जे त्याने सांगितलं ,शाळा आठवी नववीत सोडून दिलीये व आडनाव केवट आहे हे त्यानी सांगितलं.’हम केवट है’ हे सांगताना त्याच्या चेहऱ्यावर अभिमान डवरून आला होता.’पुराणो मे लिखा है, नर्मदा किनारे केवट सब से श्रेष्ठ होते है’ तो मला सांगायला लागला.मला हे ऐकून भारीच आनंद झाला.नर्मदेच्या दोन्ही तटांवर वेगवेगळ्या जनजाती व जमाती रहातात.नर्मदा परिक्रमा केल्यास सांस्कृतीक मानववंशशास्त्रा (cultural anthropology) बद्दल बरीच माहिती भेटू शकते.कालांतरानी मी ओंकारेश्वराच्या पश्चिमेस नर्मदा किनारी फारतर पन्नास किलोमिटरवर असलेल्या रावेरखेडीला पहिल्या रावबाजी पेशव्यांची समाधी बघायला गेलो होतो.समाधी बघुन झाल्यावर तिथे सहज नर्मदेत एका डोंगीत बसून फेरफटका मारला होता.त्या डोंगीच्या नावाड्याचं आडनाव वर्मा होतं व ती वर्मा लोक तिथं परंपरागत नावाडी व मच्छीमारीचं काम करतात हे पण नव्यानेच कळलं होतं. असो. जसाजसा घाट जवळ आला,आमच्या नावाड्याने दुरूनच आम्हाला मांधाता राजाचा राजवाडा दाखवला.नर्मदेच्या ऐन तीरावर नदीपात्राला लागुनच दाटीवाटीने बांधलेली घरं व नर्मदेच्या पुराच्या पाण्याचा उपद्रव होऊ नये म्हणुन त्यांच्या बांधलेल्या उंचच उंच मजबूत भिंती मला खुपच नाविन्यपूर्ण वाटल्या.घरांच्या त्या दाटीतंच तो नावाडी एका घराकडे बोट दाखवून ,वहां वो मेरा घर है,देखो असं म्हणाला.मला नक्की कोणतं त्याचं घर होतं हे शेवटपर्यंत लक्षात आलं नाही. लहानपणी रांगणं शिकण्यापूर्वी नर्मदेत पोहणं शिकलो असं ही तो सांगत होता . गप्पांच्या नादात लवकरच आम्ही घाटावर पोहोचलो व बोटीतुन उतरून घाटाच्या पायऱ्या चढून ओंकरेश्वराच्या मंदिरात गेलो.थोडावेळ रांगेत उभं राहून शिवलिंगाचं दर्शन घेतलं,मी तिथं लिंगाष्टक स्तोत्र म्हटलं होतं.बाहेर आलो व पाच एक मिनीटं थांबुन घाट उतरून खाली आलो.बोटीत बसून परत दक्षिण तीरावर आलो.तिथं त्या नावाड्याने आम्हाला जिथं उतरवलं त्याठिकाणी पायऱ्या सुरू होतात त्याच्या अलिकडेच एका गोमुखातून पाण्याचा एक मोठा झरा खळाळत नदीकडे वाहत होता.मी त्या झऱ्यात हात धुतले व तहान लागलीच होती तर तेच पाणी प्यायलो.खुपच छान वाटलं ते झऱ्याचं ताजं पाणी पिऊन,मला. घाटाच्या पायऱ्या चढून वर आलो व ममलेश्वराच्या मंदिरात जाऊन शिवपिंडीचं दर्शन घेतलं. या मंदिरात तुलनेने गर्दी काहीच नव्हती.रूद्राष्टक म्हणून मी बाहेर पडलो व मंदिर परिसरात फिरायला लागलो.मुख्य मंदिरासमोरच एक दोन लहान लहान मंदिरं होती.एका मंदिराच्या दारासमोर एक चेहऱ्याचं शिल्प ठेवलं होतं तर बाजूला प्रांगणात दोन तीन छोटे छोटे चौकोनी शिल्पं ठेवले होते.शिल्पाच्या चारही बाजूला ढाल तलवार घेतलेला योद्धा,शिवलिंगाची पुजा करणारी स्त्री,मंचावर झोपलेली व्यक्ती व आकाशातुन येणारी एक व्यक्ती व चंद्रसूर्य कोरलेले होते.मी कुतुहलापोटी यासर्वांचे फोटो काढलेत.मंदिराच्या भिंतीवर तांडवनृत्य करणाऱ्या शंकराचं शिल्प बघुन तर मला रावणानी लिहीलेलं शिवताण्डव स्तोत्रच आठवलं होतं.शंकरपार्वतीचं पण शिल्प होतं बहुतेक.या सगळ्यांचे मी फोटो काढलेत व आम्ही परत फिरलो.
घरी आल्यावर मी देगलुरकर सरांना त्या फोटो संदर्भात काॅल केला होता व त्या शिल्पांचे फोटो सरांना पाठवून दिले होते. देवळाच्या दारात ठेवलेलं चेहऱ्याचं शिल्प हे कीर्तीमुखाचं आहे तर चौकोनी शिल्प हे वीरगळ आहे,सरांनी मला सांगितलं. ‘वीरगळ’ हे प्राचिन काळी युद्धामध्ये वीरगतीला गेलेल्या एखाद्या योद्ध्याच्या स्मरणार्थ घडवल्या जायचे व मांडल्या जायचे.त्याकाळचे ते ‘अमर जवान ज्योती’ सारखे स्मारकच समजायला काही हरकत नसावी. अगदी सोमनाथला पण सरदार पटेलांनी सोमनाथाच्या मंदिराचं पुनर्निर्माण केलं तिथे पण मंदिरापासुन थोडं दूर समोर मंदिराच्या रक्षणार्थ धारातिर्थी पडलेल्या सर्व ज्ञातअज्ञात वीरांच्या स्मृतीप्रित्यर्थ एक छोटंसं स्मारकशिल्प बनवलंय.वीरगळाचं शिल्प वेगवेगळ्या धाटणीचं असू शकतं पण त्यावर सहसा ढाल तलवार घेतलेल्या योद्ध्याचं चित्र असतंच.सरांनी मला त्या चौकोनी शिल्पाच्या प्रत्येक शिल्पचित्राचा अर्थ सांगितला होता.चंद्रसूर्याचा अर्थ आकाशात चंद्रसूर्य असे पर्यंत त्या वीर योद्ध्याच्या हौतात्म्याची कीर्ती दिगंत राहिल, हे एकीकडे सर मला सांगत होते आणि जिथं ते शिल्प ठेवलं होतं तिथं ते कोणाच्या स्मृतीत ठेवलंय हे तर सोडाच पण ते एक वीरस्मारक आहे हे पण कोणाला फारसं माहिती नव्हतं याचा मी विचार करत होतो.
असंच एकदा माझ्या बहिणीकडे अलिबागला गेलो होतो.रात्रभर प्रवास करून दुसऱ्या दिवशी तिच्या घरी पोहोचलो,अंग सगळं घामाने व प्रवासाने आंबलेलं होतं.गेल्याबरोबर मस्त पंधरावीस मिनीटं आंघोळ केली व जेवण केलं.जेवणानंतर माझी बहिण मला फिरायला घेऊन निघाली.तिचे शेजारी आहेत धुमाळ काका.अगदी घरोब्याच्या संबंधातले.त्यांचं मूळगाव आहे नारंगी.ती मला नारंगीला त्यांच्या घरी व तिथुन बाजुच्या मंदिरात नेणार होती. अलिबागपासुन ईशान्येला पेणला जाणाऱ्या रस्त्यावर पिंपळभाट ओलांडला की एक मोठा डोंगर लागतो.डोंगरातला घाट जिथे संपतो तिथे कार्लेखिंडीतून एक रस्ता उत्तरेकडे वळतो व मुख्य रस्ता पुढे वडखळ पेण कडे जातो.या उत्तरेकडे वळलेल्या फाट्यावर आत वळणावळणाच्या रस्त्यानी पंधरा वीस किलोमिटरवर नारंगी गाव आहे. रस्ता पूर्ण दुतर्फा झाडीने आच्छादलेला व रस्त्याच्या पश्चिमेला सह्याद्रीची कमीजास्त उंचीची भिंत.नुकताच श्रावण लागला होता.आम्ही निघालो तेव्हा दुपार झालेली होती व सूर्य ढगा आडून अधुनमधुन डोकावत होता. कोकणातलं मोठं प्रसन्न वातावरण होतं ते.भगिनी निवेदिता मला ठिकठिकाणी थांबवुन मोठमोठाली झाडं किंवा एखाद्या तळ्यात फुललेली water lily किंवा कमळाची फुलं दाखवत होती.तिला निसर्गाची भारीच आवड, अर्थातच मलादेखील! मला तर कळत्या वयात जेव्हा पहिल्यांदा सह्याद्री बघितला,तत्क्षणीच त्याने माझ्या मनावर गारूड केलंय, ते या जन्मी उतरणार नाही हे नक्की. रमतगमत आम्ही धुमाळ काकांच्या घरी गेलो.काका घरी नव्हते काकू होत्या.अगदीच खास कोकणी पद्धतीचं गाव व घर होतं काकांचं.माझी बहिण काकूंसोबत बोलत बसली व मी त्यांच्या परसबागेत गेलो.वेगवेगळी झाडं बघुन मी चांगलाच रमलो होतो त्यांच्या परसबागेत.त्यांनी पाळलेला ससा त्याच्या पिंजऱ्यात आरामशीर पहुडला होता. त्याला बघण्यात माझा वेळ कसा गेला ते मला कळलंच नाही .गप्पा आटोपल्यावर आम्ही सरबत घेऊन गावाशेजारच्या मंदिराकडे निघालो.गावापासून दोनएक किलोमिटर दूर डोंगराच्या चढावावर ते मंदिर होतं.मंदिराच्या जवळच एक जलकुंड होतं,जलकुंड कसलं छोटा तलावच होता तो तर पश्चिमेला सह्याद्रीची भलीमोठी उंच डोंगररांग होती. मंदिराजवळच कोणीतरी नुकताच कचरा जाळला होता त्याचा धूर सर्वत्र पसरला होता,अगदी मंदिरात सुद्धा.आम्ही आत गेलो,दर्शन घेतलं व बाहेर येऊन प्रदक्षिणा घातली. गाभाऱ्यातील एका कोनाड्यात एक छोटी मूर्ती होती.मी तिचा फोटो घेतला.मंदिराच्या बाहेर बाजुला एक शिल्प होतं.एक व्यक्ती खांद्यावर एक काठी घेऊन जाताना कोरलेला होता.मी त्या शिल्पाचा फोटो घेतला होता.ते शिल्प वीरगळ असावं असा माझा अंदाज होता.पण शिल्पाच्या हातात ढाल तलवार नसून एक काठी आहे हे बघुन मला तशी खात्री नव्हती.आमच्या इतिहासाशी संबंधित व्हाॅट्सअॅप ग्रुपवर त्या शिल्पाचा फोटो टाकल्यावर प्रा.रवी बावीस्कर सरांनी ते शिल्प वीरगळच आहे हे निश्चीत करून दिलं.त्या शिल्पाच्या हातातली काठी म्हणजे भाला असावा असंही त्यांनी सांगितलं.कोनाड्यातल्या मूर्तीचा फोटो बघुन ती मूर्ती भैरवाची आहे हे देगलुरकर सरांनी सांगितलं होतं.
आता मला वीरगळाची थोडीफार माहिती झाली होती.पुढे पुसदला एका अंत्यसंस्कारासाठी जाणं झालं होतं.तिसऱ्या दिवशी सावडण्यासाठी गेलो होतो.जाताना मित्राच्या गाडीवर गेलो पण येताना सगळेजण निघुन गेलेत.मी एकटाच राहिलो होतो हे बघुन एक नातेवाइक माझ्यासाठी थांबले. आम्ही रस्त्याने पैदल परत निघालो.स्मशानातून गांधी पुतळ्याकडे येणाऱ्या रस्त्यावर आम्ही चालत होतो. त्या रस्त्यावरून करूणेश्वर मंदिराकडे जाणाऱ्या रस्त्याला वळलो आणि त्या वळणावर अगदी रस्त्याला लागुनच एक छोटंसं लाल रंगात रंगवलेलं मंदिर मला दिसलं.हा भाग गावाच्या जुन्या मध्यवर्ती भर वस्तीतला भाग आहे.या मंदिराच्या बाहेरच अगदी रस्त्याला लागुनच एक शिल्प ठेवलेलं आहे ते मला दिसलं.
शिल्पात एक व्यक्ती एका हातात तलवार व एका हातात ढाल घेऊन दाखवला आहे. हे शिल्प बघता क्षणीच मला ते वीरगळ आहे हे जाणवलं.मला फोटो घेण्याची इच्छा होती परंतू प्रसंगाचं औचित्य ओळखुन मी तो मोह आवरला होता. माझ्या डोक्यात त्या शिल्पाविषयीचे विचार सतत घोळत असायचे.कोण असेल बरं तो वीर योद्धा ज्याच्या स्मृतीप्रित्यर्थ हे शिल्प तिथं मांडलं असेल? कुठल्या समरांगणी त्याला वीरमरण आलं असेल? ते युद्ध कधी झालं असेल? कोणाच्या बाजुने तो लढला असेल व कोणाविरूद्ध? याची कसलीही माहिती मला नाही.मला फक्त एवढं माहिती की औरंगजेबाच्या काळात पुसदची जबाबदारी राजस्थानातल्या कोण्या राजपूत सरदाराकडे होती. त्याच्या सैन्यातला सैनिक असेल हा की कोणी स्थानिक मराठी सैनिक? स्थानिकच असण्याची शक्यता जास्त कारण शिल्प पुसदला आहे.बरं याविषयी अधिक माहिती देऊ शकेल असं कोणी पुसदमध्ये माझ्या ओळखीचंही नाही. या माझ्यासाठी तरी अज्ञात वीराचं हे शिल्पं वाहत्या रस्त्याच्या अगदी कडेला उन्हापावसाचा मारा सहन करत बरंचसं उपेक्षित असं पडलंय खरी.बघितलं त्या क्षणापासुन हे शिल्पं माझ्या मनात घर करून होतं. मी सर्वप्रथम ओंकारेश्वरला एक शिल्प बघितलं,तेव्हा मला वीरगळाविषयी काहीही माहिती नव्हती.सहज औत्स्युक्यापोटी मी फोटो काढले व देगलुरकर सरांना दाखवले होते.त्यांनी दिलेल्या माहिती मुळेच माझ्या मनाला वीरगळ या शिल्पसंकल्पनेची जाणीव झाली होती.त्या माहितीच्या आधारेच मी नारंगीच्या वीरगळाविषयी कयास बांधू शकलो ,जो रवी सरांनी निश्चीत करून दिला होता.तर पुढे पुसदचा वीरगळ मला अगदीच अचानक व फारच वेगळ्या परिस्थितीत बघितल्या बरोबर ओळखू आला. Eyes only see,what mind knows चा पुनःप्रत्यय मी घेतला होता हे नक्की.
(वीरगळा विषयीची ही पोस्ट लिहीताना मी माझ्या जवळील सर्व भ्रमंतीतील शिल्पांचे फोटो असलेलं फोल्डर शोधत होतो.ते पूर्ण फोल्डरच माझ्या मोबाइल व लॅपटाॅपमधूनही गहाळ झाल्याचं मला लक्षात आलं.सुदैवाने माझा बारावीतला वर्गमित्र आशिष खेडकर याच्याजवळ ओंकारेश्वराच्या वीरगळाचे फोटो व्हाॅट्सअॅपला सापडलेत.त्यानी ते मला परत पाठवलेत.कीर्तीमुखाचा फोटो मला सापडला नाही.तर पुसदच्या वीरगळाचा फोटो माझा मित्र प्रशांत भट यानी काढून पाठवलाय. आशिष व प्रशांत दोघांचेही मनःपूर्वक धन्यवाद.)
सतीशिळा :-
त्रिंगलवाडी गावातील घोडेस्वार सतीशिळा
\ सतीशिळा ही वीराची पत्नी त्याच्या मृत्युनंतर सती गेली हे दर्शवते. सतीशिळा ओळखावी कशी हे समजण्यासाठी वीरगळाचे नीर निरीक्षण करावे. त्याच वीरगळावर जर कुठेही कोपरापासून दुमडलेला हात दिसला ( चित्र क्र १ ) तर त्या वीरगळाला सतीशिळा म्हणतात. त्रिंगलवाडी किल्ल्याच्या ( ईगतपूरी, नाशिक ) पायथ्याशी प्राचीन जैन लेणी आहेत. त्यांच्या जवळ आढळलेल्या सतीशिळेबद्दल.
चित्र क्र ३. सतीशिळेचा खालचा टप्पा
चित्र क्र. ४. सतीशिळेचा मधला कप्पा
नेहमी प्रमाणे वीरगळ आणि सतीशिळा टप्प्या टप्याने समजून घेऊ.
कप्पा क्र १ . सर्वात खालचा कप्पा . चित्र क्र ( ३ )
सर्वात खालच्या कप्प्यात सती जाणारी स्त्री घोड्यावर बसलेली दिसते . सोबत तिच्या सहचरणी आहेत . त्यांच्या डोक्यावर सतीचे वाण आहे.
कप्पा क्र. २ वीरगळाच्या उजव्या बाजूला कोपरातून दुमडलेला हात ( चित्र क्र २ नारिंगी रंग )
स्वातंत्र्य पूर्व काळापर्यंत सती जाण्याची प्रथा होती. सती जाणे म्हणजे पतीच्या निधनानंतर पत्नीने त्याच्या चितेवर आत्मदहन करून घेणे. ( सदर प्रथा काळाच्या ओघात बंद झाली असल्याने त्यावर कोणतीही टिपण्णी म्हणजेच कमेंट करू नये ही वाचकांना नम्र विनंती ). जसं युद्धात वीरमरण आलं की स्वर्ग मिळे ही भावना समाजात रूढ होती तीच भावना सती जाणे ह्या चाली बद्दल होती. त्यामुळे वीराच्या चितेवर सती जाणं हे भाग्याचं समजलं जाई. सदर वीराची पत्नी सती गेली हे दर्शवण्यासाठी कोपरापासून दुमडलेला हात दाखवला आहे. हातावर ठळकपणे दिसणाऱ्या बांगड्या पत्नी सौभाग्यासह स्वर्गवासी झाली हे ठळकपणे दर्शवण्यासाठी आहेत.
कप्पा क्र. ३ वीरगळाचा खालून दुसरा कप्पा ( चित्र क्र. ४ )
हा टप्पा वीराच्या मृत्युनंतरचा प्रसंग दर्शवतो. सदर वीर हा मृत्युपश्चात शिवपिंडीची पूजा आणि आराधना करताना दिसतो. पाय दुमडून बसलेला नंदी, त्याच्या पाठीवरचं कुबड अगदी स्पष्ट दिसतं. वीराच्या पाठी त्याची पत्नी सुद्धा हात जोडून बसलेली दिसते. शिव आराधना करून त्यांना स्वर्गप्राप्ती झाली असं दर्शवले आहे.
कप्पा क्र. ४ सूर्य, चंद्र आणि कलश
चित्र क्र २ मध्ये कलशाच्या खाली चंद्रकोर आणि संपूर्ण सूर्य कोरलेले दिसतात. यावत्चंद्रदिवाकरो म्हणजेच जोवर आकाशात चंद्र सूर्य असतील तोवर यांची किर्ती टिकेल असा त्याचा अर्थ आहे. पण त्यावर शिलालेख नसल्याने लढाईचं कारण, वीराचं नाव आणि इतर बारकावे लक्षात येत नाहीत. सर्वात वर कलश काढलेला आहे. कलशाचा अर्थ सदर वीर दांपत्याला मोक्षपद मिळाला असा असतो.
गद्देगळ : -


गधेघळ : एक विशिष्ट प्रकारचा शिलालेख
‘गधेघळ’ हा एक वैशिष्ट्यपूर्ण शिलालेख असून, तो प्रामुख्याने दंडविधान, आदेशपालन आणि स्मृतीचिन्ह म्हणून उपयोगात आणला जात असे. या प्रकारचा शिलालेख वीरगळासारखाच असून, विशेषतः आज्ञा न पाळणाऱ्याला दिली जाणारी शिक्षा व त्या संदर्भातील आज्ञा किंवा दानाचे स्मरण यासाठी उभारलेला असतो.
गधेघळाचे रचनात्मक स्वरूप – तीन प्रमुख भाग
गधेघळ हा शिलालेख सहसा तीन भागांत विभागलेला आढळतो:
1. वरील भाग:
या भागात सूर्य, चंद्र व कलशाच्या कोरीव प्रतिमा असतात. यांचे उद्दिष्ट म्हणजे शिलालेखातील मजकूर चिरकाल स्मरणात राहावा, ही देवतेप्रती शपथ असल्याचे सूचित करणे.
2. मधला भाग:
येथे दानविषयक मजकूर असतो. विशेषतः भूमीदान, मठदान किंवा कोणत्यातरी सामाजिक वा धार्मिक घोषणेची माहित या भागात कोरलेली असते. हा मजकूर अनेकदा देवनागरी लिपीत** असून, त्यात दानकर्ता, दानग्राही, कालखंड, साक्षीदार अशांची नोंद केलेली असते.
3. खालचा भाग:
सर्वात लक्षवेधी भाग म्हणजे हा. येथे एका स्त्री व गाढवाचे शिल्प कोरलेले असते. यामागचा उद्देश म्हणजे – शिलालेखात नमूद केलेल्या आज्ञा वा दानाचे पालन न करणाऱ्याला गाढवावर बसवून गावात फिरवले जाईल, अशी सामाजिक शिक्षा दिली जाईल – हे स्पष्टपणे दाखवणे.
गधेघळ आणि वीरगळ यातील साम्य आणि फरक
गधेघळ हे शिल्प वीरगळाप्रमाणेच वीरगती प्राप्त झालेल्या व्यक्तीच्या स्मरणार्थ उभारले जाते. मात्र वीरगळात युद्ध प्रसंग, स्वर्गारोहण वा बलिदानाचे दृश्य दिसते, तर गधेघळावर आज्ञेचे पालन न करणाऱ्या व्यक्तीस दिली जाणारी शिक्षा हाच मुख्य विषय असतो. यामुळे या दोघांमध्ये सादृश्य असूनही विषयवस्तूत फरक आहे.
धार्मिक प्रतिमांचा वापर
काही गधेघळांवर शिवलिंग, नंदी, किंवा धार्मिक चिन्हे देखील आढळतात, जे त्या दानाच्या धार्मिक स्वरूपाकडे इशारा करतात. यामुळे गधेघळ केवळ शासकीय किंवा सामाजिक आदेशाचेच नव्हे, तर धार्मिक कर्तव्याचेही प्रतीक मानले जाते.
कालखंड आणि उत्पत्ती
गधेघळाची परंपरा शिलाहार राजवटीपासून (सुमारे इ.स. ९ व्या-१० व्या शतकापासून) सुरू झाली असावी, असे अनेक संशोधक मानतात. या शिलालेखांची रचना व शैली पाहता, ही परंपरा १६व्या शतकापर्यंत सुरु होती असे दिसते. कालखंड निश्चित करताना त्यावरील शिल्पकला (अलंकृत की साधी?), लिपी, वापरलेला दगड, स्थापत्य शैली आणि शिलालेखातील मजकूर यांचा अभ्यास केला जातो.
१) डॉ. अरविंद सोनटक्के, दिगंबरराव बिंदू महाविद्यालय, भोकर. जि. नांदेड. (9423139676)
२ ) इतिहासाचे मूक साक्षीदार वीरगळ आणि सतीशिळा, श्री. अनिल दुधाणे.
३ ) viluptduniya.wordpress.com
४ ) singhh63.blogspot.com
५ ) historicano2.blogspot.com
६ ) https://www-metmuseum-org.translate.goog/exhibitions/tree-and-serpent?_x_tr_sl=en&_x_tr_tl=hi&_x_tr_hl=hi&_x_tr_pto=tc&_x_tr_hist=true
७ ) amarujala.com
८ ) discovermh.com
९ ) https://www.instagram.com/p/CEVfi4TB-JU/
१० ) https://bhimthadiheritage.blogspot.com/p/herostone.html
११ ) https://singhh63.blogspot.com/2018/12/blog-post_24.html
१२ ) todkaronkar.blogspot.com
बळी वामनाची वास्तवकथा - वस्तुत: ह्या वामनाच्या कथेतल्या बळीराजाचा शेतकर्यांशी काडीमात्र संबंध नसताना तो जोडला जाऊन ह्या कथेतून ब्राह्मण वर्ग हा शेतकर्यांशीच द्रोही आहे असे ठासविण्याचा विकृत हेतु सांप्रत लेखनांतून सतत सुरु आहे
धर्माचे पालन, करणे पाषांड खंडन !
हेंचि आम्हा करणें काम, बीज वाढवावें नाम !
तुकोबाराय
सर्वप्रथम सर्वांना दीपावलीच्या व पाडव्याच्या नैका: हार्दा: शुभाशया: !
एक असत्य सहस्त्रवेळा सांगितले की ते सत्य वाटायला लागते ह्या गोबेल्स तंत्राप्रमाणे एरवी सर्व धर्मेतिहास थोतांड असला तरी हेतुपुरस्सर प्रतिवर्षी दीपावली आली व पाडवा आला की बळी व वामनावताराची मूळची सूर्याची रुपक कथा, जी पुराणांनी अकारण ऐतिहासिक करून विपर्यस्त केली, त्या कथेंस आपल्या टीपिकल ब्रेकिंग इंडिया प्रक्रियेसाठी व फोडा नि झोडा ह्या अनीतीसाठी तिचा विपर्यांस करून ब्राह्मण-विरुद्ध ब्राह्मणेतर, तथाकथित बहुजन, आर्य-अनार्य वाद पेटवित राहणे हे सांप्रतचे धंदे आपणांस समाजमाध्यमांतून तर नेहमीच पहायला मिळतात. त्यावर काहींनी तर म्हणे ग्रंथनिर्मितीही केली आहे.
वस्तुत: ह्या वामनाच्या कथेतल्या बळीराजाचा शेतकर्यांशी काडीमात्र संबंध नसताना तो जोडला जाऊन ह्या कथेतून ब्राह्मण वर्ग हा शेतकर्यांशीच द्रोही आहे असे ठासविण्याचा विकृत हेतु सांप्रत लेखनांतून सतत सुरु आहे.
शेतकर्याला बळीराजा म्हणायचेच असेल तर त्यांचा संबंध भगवान श्रीकृष्णांचे थोरले बंधु बलराम दादांशी जोडायला हवाय ज्यांच्या हातात आपण सदैव हल म्हणजे नांगर पाहतो. त्यांची गदा व हल म्हणजे नांगर ही प्रमुख आयुधे आहेत. पण हेतुपुरस्सर त्याचा संबंध बळी वामनाच्या कथेशी जोडून भेदनीती अवलंबिली जातीय, त्याचे खंडन करण्यासाठी व ह्या कथेचा नेमका परामर्श घेण्यासाठी केलेला हा लेखनप्रपंच !
वामनावताराची पुराणांतली कथा ही मूळ वैदिक रुपक कथेचे ऐतिहासिक अलंकारिक रुपांतर आहे.
पुराणांतली कथा आम्ही इथे सांगत बसत नाही ती सर्वांस परिचित आहे. तेंव्हा ही कथा मूळची ऋग्वेदांतली पहिल्या मंडलातली २२ व्या व १५४ व्या सूक्तांमधील ऋचेंवरून घेतली आहे, ज्यात तो सूर्य अर्थात विष्णु ह्या तीन गोष्टींना आपल्या तीन पाऊलांत व्यापतो. ज्यात ही तीन पाऊले म्हणजे दिवसाचे तीन सकाळ, सायंकाळ व रात्र असे तीन भाग किंवा विश्वाचे पृथ्वी, आकाश व पाताळ असे तीन भाग ह्या अर्थाने आहे. ही सूर्यकिकरणांनी व्यापिलेल्या ह्या तीन भागांची रुपक कथा ऋग्वेदामध्ये आहे. ह्या तीन पाऊलांत तो सूर्य अर्थात विष्णु सर्व विश्व व्यापितो. ते मूळ पाच मंत्र पाहुयांत.
अतो॑ दे॒वा अ॑वंतु नो॒ यतो॒ विष्णु॑र्विचक्र॒मे । पृ॒थि॒व्याः स॒प्त धाम॑भिः ॥१६॥
इ॒दं विष्णु॒र्वि च॑क्रमे त्रे॒धा नि द॑धे प॒दं । समू॑ळ्हमस्य पांसु॒रे ॥१७॥
त्रीणि॑ प॒दा वि च॑क्रमे॒ विष्णु॑र्गो॒पा अदा॑भ्यः । अतो॒ धर्मा॑णि धा॒रय॑न् ॥१८॥
विष्णोः॒ कर्मा॑णि पश्यत॒ यतो॑ व्र॒तानि॑ पस्प॒शे । इंद्र॑स्य॒ युज्यः॒ सखा॑ ॥१९॥
तद्विष्णोः॑ पर॒मं प॒दं सदा॑ पश्यंति सू॒रयः॑ । दि॒वी॑व॒ चक्षु॒रात॑तं ॥२०॥
तद्विप्रा॑सो विप॒न्यवो॑ जागृ॒वांसः॒ समिं॑धते ।विष्णो॒र्यत्प॑र॒मं प॒दं ॥२१॥
ह्या पाचही मंत्रांचा अर्थ सायण नावाच्या भाष्यकारानुसार सांगायचा तर विष्णूने अर्थात सूर्याने ह्या संसारास तीन पाऊलांनी व्यापिलं आहे. इथे सायणाचार्यांचे भाष्य आपण अभ्यासले तर इथे अकारण वामनावताराची मनगढन्त कल्पना केली आहे. वेदांमध्ये कोणत्याही अवताराची कथा नाहीये. पण पुराणांमध्ये ती आलीय. आता १५४ वं पूर्ण सूक्त पाहुयांत.
विष्णो॒र्नु कं॑ वी॒र्या॑णि॒ प्र वो॑चं॒ यः पार्थि॑वानि विम॒मे रजां॑सि ।
यो अस्क॑भाय॒दुत्त॑रं स॒धस्थं॑ विचक्रमा॒णस्त्रे॒धोरु॑गा॒यः ॥१॥
प्र तद्विष्णुः॑ स्तवते वी॒र्ये॑ण मृ॒गो न भी॒मः कु॑च॒रो गि॑रि॒ष्ठाः ।
यस्यो॒रुषु॑ त्रि॒षु वि॒क्रम॑णेष्वधिक्षि॒यंति॒ भुव॑नानि॒ विश्वा॑ ॥२॥
प्र विष्ण॑वे शू॒षमे॑तु॒ मन्म॑ गिरि॒क्षित॑ उरुगा॒याय॒ वृष्णे॑ ।
य इ॒दं दी॒र्घं प्रय॑तं स॒धस्थ॒मेको॑ विम॒मे त्रि॒भिरित्प॒देभिः॑ ॥३॥
यस्य॒ त्री पू॒र्णा मधु॑ना प॒दान्यक्षी॑यमाणा स्व॒धया॒ मदं॑ति ।
य उ॑ त्रि॒धातु॑ पृथि॒वीमु॒त द्यामेको॑ दा॒धार॒ भुव॑नानि॒ विश्वा॑ ॥४॥
तद॑स्य प्रि॒यम॒भि पाथो॑ अश्यां॒ नरो॒ यत्र॑ देव॒यवो॒ मदं॑ति ।
उ॒रु॒क्र॒मस्य॒ स हि बंधु॑रि॒त्था विष्णोः॑ प॒दे प॑र॒मे मध्व॒ उत्सः॑ ॥५॥
ता वां॒ वास्तू॑न्युश्मसि॒ गम॑ध्यै॒ यत्र॒ गावो॒ भूरि॑शृंगा अ॒यासः॑ ।
अत्राह॒ तदु॑रुगा॒यस्य॒ वृष्णः॑ पर॒मं प॒दमव॑ भाति॒ भूरि॑ ॥६॥
ह्या सूक्ताचा संक्षेपांत अर्थ पहायचा म्हटला तर मी त्या विष्णूचे अर्थात सूर्याचे वर्णन करतो ज्याने तीन पाऊलांत समग्र विश्व व्यापिले आहे व आकाशांस स्थिर केले आहे. ज्याने पृथ्वी, द्युलोक व समस्त भूवनांस धारण करून ठेवलेलं आहे, ज्याने निर्माण केलेल्या औषधी, अन्नादिंनी मनुष्याचे पोषण होते, त्यांस मी वंदन करतो.
इथे विष्णु म्हणजे दुसरे कुणीही नसून तो सूर्य ह्या अर्थाने आहे. सूर्य तीन पाऊलांनी तीन भूवने व्यापितो ह्याचाच अर्थ विष्णूची तीन पाऊले आहेत.
आश्चर्य म्हणा किंवा शोकांतिका म्हणा
ह्या संपूर्ण मंत्रांमध्येच काय पण चारीही वेदांमध्ये कुठेही बलीचा साधा किंवा पुसटसा उल्लेखही नाहीये. नाही म्हणजे ना आणि ही. तरीही पुराणांनी ही मनगढन्त कथा का रचली व त्यासाठी व्यासांचा नावाचा बळी अकारण का दिला हेच कळत नाहीये. असो त्यावर कधीतरी सविस्तर भाष्य करुच.
ऋग्वेदांतले आणखी काही मंत्र जिथे जिथे ह्या तीन पाऊलांच्या विष्णु म्हणजे सूर्याच्या तीन पाऊलांच्या कथेचा वामनावताराशी वरवरपाहता अर्थ प्रतिध्वनित होतोय असा भ्रम होतो. ऋग्वेद १.११५.४,६.४९.१३,७.१००.४८.१२.२७ ह्या सर्वांत व अन्यत्र "उरुगाय", " विचक्रमे", उरुक्रम:, मिमान:, रजसो विमान:, पार्थिवानि विममे आदि मंत्रांमध्ये देखील हेच विष्णुच्या त्रिपाद विक्रमाचे संदर्भ आहेत. अन्य तीन वेदांतले मंत्रही ह्याच प्रकारचे असून तिथेही विष्णुच्या अर्थात सूर्याच्या किंवा परमेश्वराच्या त्रिपाद विक्रमाचे वर्णन आहे. विस्तारभयास्तव ते वर्णित नाही.
आता भाष्यकारांचे अर्थ पाहुयांत.
स्कंदस्वामी नावाचे ऋग्वेदांवरचे सर्वात प्रथम भाष्यकार ह्याचा मुख्यत: इतिहासपरक व गौणत: सूर्यपरक असा दोन्ही अर्थ करतात. इतिहासपरक अर्थ करताना ते सप्तधाम अर्थात पृथ्वीचे सात द्वीप असा अर्थ करतात. १.२७.२० ह्या मंत्राचा अर्थ प्रकट करताना स्कंदस्वामी सूर्यपरक अर्थ करतात व त्यात विष्णु हा सूर्य असून जो प्रत्यही विक्रमण करतो व उदय, मध्यान्ह व अस्त ही त्याची तीन पाऊले आहेत असा रुपक अर्थ प्रकट करतात. ते तीन लोकांची आणखी कल्पना करताना अग्नीरुप पृथ्वीस, विद्युतरुप अंतरिक्षांस व सूर्यरुप द्युलोकांस व्यापतो असे रुपक करतात. यजुर्वेदभाष्यकार उव्वट व महीधर हे वामनावतारच मानतात.
वेंकटमाधव हे भाष्यकार ह्या मंत्रांचा अध्यात्मपरक व सूर्यपरक अर्थ करतात. त्यांच्या मते विष्णु हे परमपद यज्ञ असून सप्तछंद हे सप्त धाम आहेत, मनुष्यांच्या कर्मांचे बंधन हे ह्या विष्णूचे खरे कर्म आहे. सूर्यपरक अर्थामध्ये ते विष्णूंस इंद्राचा नियोज्य सखा व आकाशांत पसरलेले तेज हे परमपद असा अर्थ घेतात.
मुद्गल नावाचे भाष्यकार ह्याचा अध्यात्मपरक अर्थ करताना ईश्वरांस जगताचा पालक, रक्षक सांगतात. व त्रेधा ह्या शब्दांवरून ईश्वर हा कर्ता, धर्ता व संहर्ता रुपांत आहे हे सांगतात. गायत्र्यादि सात छंद हे सप्तधाम आहेत असा अर्थ ते करतात.
जिज्ञासूंनी ह्या तीन्ही भाष्यकारांचे भाष्य निम्नलिखित संकेतस्थलांवरून संग्राह्य करून प्राप्त करावे. करावे. https://archive.org/details/RigVeda31 इथे ते प्राप्त होईल.
वेदमहर्षी श्रीमत्स्वामी दयानंदांचा अर्थ
वेदांवरचे षड्वेदांगाना अनुकूल असे आजपर्यंतचे सर्वोत्तम भाष्यकार व वेदादिधर्मशास्त्राविषयीच्या अनेक भ्रांतींचे निवारण करणारे वेदोद्धारक ऋषिश्रेष्ठ, ज्यांची पुण्यतिथी कालच अमावस्येंस झाली, ते आपल्या ऋग्वेद भाष्यामध्ये उपरोक्त मंत्रांचा अर्थ अध्यात्मिक करतात व विष्णुंस संसारांत व्याप्त असण्याने निराकार परमेश्वराचे द्योतक मानतात. ते "त्रेधा निदधे पदम्" ह्या व "विष्णुुपद" ह्याचा संबंध सृष्टीरचनेच्या संदर्भात लावताना परमेश्वर आपल्या पायांनी अर्थात प्रकृती, परमाणु आदि सामर्थ्याच्या अंशाने सर्व जगांस तीन स्थानांमध्ये धारण करतो असा व्यापक अर्थ करतात.
निरुक्तकार यास्कांचा अर्थ
षड्वेदांगापैकी एक प्रमुख अशा निरुक्तामध्ये विष्णुपद ह्या विषयांवर यास्कमूनीसुद्धा परमेश्वराने सृष्टी बनविताना तीन प्रकारची रचना दाखवितात असा अध्यात्मपरक अर्थच केला आहे.
वेदमहर्षी श्रीपाद दामोदर सातवळेकर सुद्धा ह्या मंत्रांचा परमात्मपरक अर्थच लावताना परमात्मा सप्तधामांमध्ये अर्थात पृथ्वी, आप, तेज, वायु, आकाश, तन्मात्रा, महत्तत्व ह्या सात तत्वांत व्याप्त होऊन पराक्रम दर्शवितो असा अर्थ प्रकट करतात. सात्विक, राजस व तामस ह्या तीन भेदांनी क्रमश: द्युलोक, अंतरिक्ष व भूलोक हे तीन पाद अर्थात पाय आहेत असा अर्थ करतात.
जयदेव शर्मा विद्यालंकार ह्यांनी देखील परमात्मपरक अर्थच केला आहे. जास्ती कशाला अहो परकीय अशा पाश्चात्य भाष्यकार मैक्सम्युलर, मैक्डौनेल, कीथ, ग्रिफीथ हे देखील विष्णूंस सूर्य मानूनच अर्थ प्रकट करताना आपल्याला दिसतात.
मग हे वामनाचे स्वरुप आले कुठून???
तर तैत्तिरीय संहितेमधून २.१.३१ येथून. ह्यानंतरच सर्व परवर्ती भाष्यकारांनी ह्याचा अर्थ अकारण वामनावताराची जोडला आहे. अर्थात पुराणांनी अकारण बळीला मध्येच घुसडले आहे जे ह्या आधीच्या उपरोक्त ग्रंथांत कुठेही उल्लेखिलेले नाहीये.
वेदांवरचे व्याख्यानरुपी असे ब्राह्मणग्रंथांतील वर्णन
शतपथ ब्राह्मण ह्या ग्रंथामध्ये ह्याचा अर्थही विस्ताराने वर्णिताना विशुद्ध असा यज्ञपरक केला असून विष्णु हे यज्ञाचे स्वरुप असून यज्ञीय देवता असाही केला आहे. "वामनो हि विष्णुरास:" असे १.२.५.५ येथे शतपथामध्ये म्हटले आहे. "यो वै विष्णु: स यज्ञ:" (५.२.३.६) येथे व "विष्णुर्वैयज्ञ:" असे ऐतरेय, तांड्य, तैत्तिरीय ब्राह्मण व गोपथ ब्राह्मणामध्येही म्हटलेलं आहे.
निरुक्तामध्ये विष्णु शब्दाचा अर्थ पदार्थांमध्ये व्याप्त व प्रविष्ट गुण अशा अर्थाने आहे. त्याची व्युत्पत्ती निम्नलिखित आहे.
विष्लृ- व्याप्तौ, विश-प्रवेशने, वि पूर्वक अशूङ्-व्याप्तौ धातु पासून हा विष्णु शब्द सिद्ध होतो. निरुक्तावर भाष्यकरताना दुर्गाचार्य, ज्याचे "निरुक्ताचे मराठी भाषांतर" नावाने भाषांतर इतिहासाचार्य राजवाड्यांचे बंधु वैजनाथ काशिनाथ राजवाड्यांनी केलंय, जे पीडीएफ उपलब्धही आहे, त्यातही सूर्य हाच अर्थ दुर्गाचार्य करतात. भगवद्दत्त रिसर्च स्कौलर व शिवनारायण शास्त्री हे निरुक्तभाष्यकारही हाच अर्थ घेतात.
शौनकाच्या बृहद्देवतेमध्ये सूर्याच्या नावांची व्युत्पत्ती सांगताना
विष्णातेर्विशतेर्वा स्याद् वेवेष्टेर्व्याप्तिकर्मण: !
विष्णुर्निरुच्यते सूर्य: सर्वं सर्वान्तरश्च य: !
२.६९
अर्थ - विष्णु हा शब्द व्यापणारा ह्या अर्थाने विष्णूची त्या सूर्यस्वरुपांत व्याख्या केलीय जो सर्व काही व सर्वव्याप्त आहे.
उपनिषदांमध्येही व्यापक परमात्मा असा अध्यात्मपरकच अर्थ आहे. काठक संहिता ३/९, मैत्रायणी ६.२६, ६.१६, ७.७, तैत्तिरीय १.१.१ येथेही हेच वर्णन आहे. म्हणजे उपनिषदे देखील हाच व्यापक अर्थ प्रकट करतात.
आता लौकिक साहित्यातला अवतारपरक अर्थ कुठे कुठे आहे ते पाहुयांत.
रामायणामध्ये, महाभारतामध्ये तीन वेळा, पुराणांमध्ये तर अतिरंजित असा आहे. अर्थातच तो प्रक्षेप आहे हे सिद्ध आहे. विस्तारभयास्तव आम्ही ते सर्व संदर्भ देऊ शकत नाही. जिज्ञासूंनी ते पहावेत. क्षमा.
ह्या सर्वांच्या विवेचनाचा निष्कर्ष काय????
ऋग्वेदामध्ये कुठेही विष्णुसाठी वामन शब्दाचा प्रयोग नाहीये व बळीचे नावही नाहीये ! आम्ही वरही सांगितलंय की बली हा शब्दही चारी वेदांच्या संहितांमध्ये नाही म्हणजे नाहीच.
वैदिक साहित्यापासून पौराणिक साहित्यापर्यंत ह्या आख्यानाचे अर्थ किती बदललेले आहेत व उत्तरोत्तर ते किती विकृत होत गेले आहेत हे आपल्या लक्षात येईल. त्यामुळेच वैदिक मंत्रावरून जे तसा अवतारपरक व ऐतिहासिक अर्थ काढण्याचा प्रयत्न करतात ते सर्व लोक चूकीच्या दिशेवर आहेत हे सांगण्यांस कोणताही प्रत्यवाय नाहीये.
वामन हे नाव व त्याच्या रुपाची प्रेरणा व कल्पना तैत्तिरीय संहिता व ब्राह्मणग्रंथ, जे वेदांवरची व्याख्यानरुपी ग्रंथ आहेत हे आम्ही अनेकवेळा सांगत आलोय, त्या ब्राह्मणग्रंथांमध्येदेखील हे सर्व वर्णन केवळ आख्यानस्वरुपाने आलंय. कारण ब्राह्मणग्रंथांची शैली ही मूळातच आख्यानात्मक व रुपकात्मक आहे. व ती अलंकारिक आहे. त्यामुळे त्यामध्ये ह्या वर्णनांत ऐतिहासिक पक्ष सिद्ध होत नाहीच नाही. आमच्या आधीच्या आचार्य शंकराचार्यांच्या लेखातही आम्ही वेदांमध्ये नित्यपक्ष सिद्ध केला आहे.
आर्याक्रमण सिद्धांत सप्रमाण खोडणार्या एका मुख्यमंत्र्यांच्या ग्रंथांचा संदर्भ
डॉ. संपूर्णानंद हे नाव अनेकांनी ऐकलं असेल. ते उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री होते. अतिशय विद्वान मनुष्य ! त्यांनी
यह आर्योंका आदि देश है
नावाने जो ग्रंथ लिहिलाय, त्यात पृष्ठ क्रमांक २०३ वर वैदिक आख्यान मांडताना ह्या कथेवर भाष्य करताना "सूर्य का पहिय्या व विष्णु के तीन पाद" ह्या शीर्षकाखाली ही पूर्ण वेदांतली कथा कशी रुपक कथा आहे व पुराणांनी अकारण त्याचे कसे ऐतिहासिक रुपांतर करून विपर्यांस केलाय हे सविस्तर लिहिलं आहे. तो ग्रंथ पीडीएफ उपलब्धही आहे. जिज्ञासूंनी तो वाचावा ही विनंती.
अंतिम निष्कर्ष
पूर्वोक्त आख्यान हे दोन स्वरुपांत आपणांस पाहता येईल.
१. प्रकृतीपरक अर्थात सूर्याच्या स्वरुपांत
२. रुपक अलंकांरिक अर्थात परमात्मस्वरुपामध्ये
१. ह्यात प्रकृतीपरक अर्थ घेणार्यांमध्ये निम्नलिखित भाष्यकार आणखी सांगता येतील.
अधिकांश भारतीय तथा पाश्चात्य भाष्यकार जसे यास्कमूनी, शाकपूणि, और्णवाभ, मेधातिथी, शौनक, स्कंदस्वामी, वेेंकटमाधव, लोकमान्य टिळक, मैक्सम्युलर, मैक्डोनल, कीथ, ग्रिफीथ, बेर्गेन, !
डॉ सर्वपल्ली राधाकृष्ण त्यांच्या "इंडियन फिलॉसॉफी"ह्या अभ्यासपूर्ण ग्रंथामध्ये ४९५ पृष्ठांवर सूर्यच अर्थ घेतात. डॉ. बलदेव उपाध्याय त्यांच्या "वैदिक साहित्य और संस्कृती" ह्या ग्रंथामध्येही सूर्यच अर्थ घेतात. डॉ. एस एन दासगुप्ता देखील आदित्य असाच अर्थ घेतात (दि हिस्टरी एफ इंडियन फिलॉसौफी भाग द्वितीय, पृष्ठ ५३५). डॉ. रामचंद्र मजुमदार हे नामवंत इतिहासकारही सूर्याचेच प्रतीक असा अर्थ घेतात.
२. अध्यात्मपरक अर्थात परमात्मवाचक अर्थामध्ये महर्षि दयानंद, मुद्गल, जयदेव शर्मा विद्यालंकार, सातवळेकर, महर्षी अरविंदसुद्धा.
मग आता पुराणांमधल्या वामनावताराच्या कथेचं काय???
तर ही कथा रुपक अर्थाने आहे हे स्पष्ट होत असून त्यात झालेली अत्युक्ती ही त्याज्य असून जरी ती स्वीकारायची म्हटली तरी ती ऐतिहासिक अर्थाने न घेता अध्यात्मपरक व रुपक अर्थाने घ्यावी हीच विनंती !
शेवटचे
ज्या ब्रेकिंग इंडिया फोर्सेसना ह्यात ब्राह्मण विरुद्ध ब्राह्मणेतर, आर्य विरुद्ध अनार्य, बहुजन वगैरे भिकार नि टुकार वाद रंगवायचे असतील त्यांनी ते खुशाल रंगवावेत व द्वेष पसरवत राहावा. एरवी सर्व पुराणे, रामायणं महाभारत वगैरे तुम्हाला थोतांड असतं, काल्पनिक असतं. पण ह्याच तुमच्या कल्पनेतल्या कथांचा उपयोग स्वत:च्या विकृत मानसिकतेसाठी वारपण्याची धंदेवाईक कला तुम्हांसच यावी हो. कारण तुम्हाला तसेही काही काम आहेच कुठे??? समाज जोडायचा का की तो तोडायचा हे ठरविण्यांस वाचक सूज्ञ व जिज्ञासू आहेत. जास्ती काही लिहित नाही.
तुका म्हणे सत्य सांगे, येवोत रागे येतील ते
गुण अवगुण निवाडा, म्हैस म्हैस रेडा रेडा !
हा तो निवाड्याचा ठाव, खर्या खोट्या निवडी भाव !
अंगे उणे त्याचे बसे टाळक्यांत, काय करु म्हणे आम्ही धक्का खवंदासि लागतसे !
जगद्गुरु तुकोबाराय
अलमतिविस्तरेण बुद्धिमद्वर्य्येषु !
तुकाराम चिंचणीकर
पाखण्ड खण्डिणी
Pakhandkhandinee.blogspot.com
#बळी_वामन_वामनावतार_ब्राह्मण_ब्राह्मणेतर_भेदनीती_वस्त्रहरण
.
गडकोट, पुरातन मंदिरे, मुर्तीशास्त्र, मंदिर स्थापत्य आणि त्यांच्या माहितीपूर्ण अभ्यासासाठी खालील BLOG आणि channel नक्की पहा आणि subscribe करा
HISTORICANO
https://historicano2.blogspot.com
HISTORICANO instagram
https://instagram.com/historicano?utm_medium=copy_link
HISTORICANO Facebook
https://www.facebook.com/historicano/
गौरवशाली इतिहास
https://youtube.com/c/GauravshaliEtihas
किरण मेंगले
https://youtube.com/c/KiranMengale
वाट भटकंतीची
https://youtube.com/c/VaatBhatkantichi
Vahanas (Mounts)
Deities of the Hindu pantheon are known to always exist with their vahanas. Like the accessories in their hands (ayudhas), the vahanas are also peculiar to each deity and

Wraiths/wisps
Not all mythical creatures are monsters. But creatures like Wraiths/wisps are monsters. If you heard of European folklore, you may aware of wraiths. Every
culture has its own myths about legendary creature that passed from
generation to generation. People may believe some. When others
far-fetched. No one can prove they are real. No one can prove they are
not real.
Wraith is a Scottish dialectical word for ‘ Ghost’. Now a days it is used for ghost-like undead being. They may have dark powers. World happen upon the idea of wraiths from European folklore. They habitat mostly in dark forests and caves. They are often portrayed as dark shadow-like creatures wearing black, hooded cloaks. Their arms and legs skinny, bony. Presence of wraiths /wisps made atmosphere extreme cold.
Wraiths are
barely visible. Wraiths/wisps usually seen before death as an
apparition. Sometimes they are vengeful, sometimes they are helpful.
According to mythological tales, if someone dies under tragic
circumstances, they become a vengeful spirit. Or someone dies with a lot
of contact with magic, they appear as wraiths to help lost traveller.
On
the other hand wisps hate lost traveller. They confronted as a ball of
light and often lead them astray. According to lord of the ring, a wraith is someone who was killed but lives on due to dark sorcery or someone who died in dishonour.
There are also a myth described that wraiths were once people who practiced dark magics. These people tried to extend their life for many hundred years. But result was not expected. They became soul that is deprived of substance and face with rotten skin.
Wraiths true forms are revealed by mirrors. In mirror one can see them as humanoid creature with rotten skin and zombi like feature. Their main weakness is silver. Silver burns their skin, being stabbed in the heart by a silver blade will kill them. Moreover they are very agile and have ability to crawl through walls and attack on its victims.
डॉ. अरविंद सोनटक्के,
दिगंबरराव बिंदू महाविद्यालय, भोकर. जि. नांदेड.
(9423139676)
singhh63.blogspot.com
गद्देगळ:
एखाद्या मंदिरात दान दिले, वर्षासन दिले की त्याचा भंग होऊ नये म्हणून गद्देगळ उभारत. यात गाढव व स्त्रीचे संकर करतानाचे शिल्प असते. त्यावर चंद्र सूर्य असतात.
मंदिरात दिलेले वर्षासन / दान आकाशात चंद्र सूर्य असेपर्यंत चालू राहो असा त्याचा अर्थ. या शिल्पांच्या वर-खाली मोकळ्या जागेत शिलालेख असतो.
यात मंदिरास दिलेल्या इनामाबाबत व शापवाणीबद्दल {शिवीचा} उल्लेख आढळतो.
गद्देगळ एक प्रकारची शापवाणीच आहे. मंदिरास दिलेले वर्षासन जो मोडेल किंवा मंदिराचे इनाम चोरेल/ त्याचा गैरवापर करेल त्याला हा शाप लागतो, हा गद्देगळ कोरण्यामागचा उद्देश.
लेख लिहिताना ....
वरील लेख लिहिताना श्री. सदाशिव टेटवीकर यांच्या ‘महाराष्ट्रातील वीरगळ’ या पुस्तकाची खूप मदत झाली.
तसेच सतीश शिंदे {सह्याद्रीवेडा} , सागर सुर्वे, संतोष तुपे, अमित निंबाळकर यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. स्वप्नील खलाटे, संतोष तुपे, श्रीराम कुलकर्णी, बा रायगड परिवार यांनी छायाचित्रे पुरवली. हा लेख निखील आघाडे यांच्यामुळे pdf स्वरुपात आला.
लेख बनवण्यास मदत करणाऱ्या ज्ञात अज्ञात सर्वांचे मनपूर्वक आभार....
संकलन/लेखन – सुजय खलाटे
(ब्लॉग मध्ये काही त्रुटी असल्यास कमेंटबॉक्स मध्ये नक्की कमेंट करा .)https://bhimthadiheritage.blogspot.com/p/herostone.html
वीरगळ (Hero Stone)
कर्नाटकातल्या वीरगळांशी महाराष्ट्रातल्या वीरगळांचे विशेष साम्य आहे. कर्नाटक-महाराष्ट्रातील वीरगळांवर वीर हा कैलासावर शिवाची पूजा करताना दिसतो; कैलासवासी होतो. मात्र कर्नाटकातील गदगसारख्या काही ठिकाणी तो शिवाऐवजी विष्णूची वा नरसिंहाची पूजा करताना दिसतो; वैकुंठवासी होतो. शैव-वैष्णव वादाची छाया वीरगळांवर ही पडलेली दिसते.
कर्नाटकातील ‘वीर-कलां’ चे थोडे सूक्ष्म निरीक्षण केल्यास त्यांचे मूळ ‘स्मृतिमंदिरां’त असल्याचे स्पष्ट होते. अनेक ‘वीर-कलां’वर, चित्रचौकटींवर मंदिरांच्या प्रतिकृती कोरलेल्या आहेत. द्राविड मंदिरशिल्पाच्या प्रतिकृती स्पष्ट दिसतात. राजघराण्यांतील व्यक्तींच्या स्मरणार्थ देवांची मंदिरे बांधली जात. सामान्य माणसे मंदिरे बांधण्याऐवजी त्यांच्या छोटेखानी प्रतिकृती निर्माण करून वीरांची स्मृती जतन करीत. वीरगती पावलेल्या माणसांच्या स्मरणार्थ राजस्थानात ‘पालिया’ उभारतात. मात्र येथे बऱ्याच वेळी दगडाऐवजी लाकडाचा वापर करून स्तंभ उभारले जातात. कधी फलकांचाही ह्यासाठी वापर केला जातो.
गढेगाळ (शापवाणी शिल्प)
वीरगळांसारखीच यांची रचना. उभट आयताकृती दगड आणि वर घुमटी. मात्र या गधेगाळांवर शिलालेख आढळतात. मुख्य म्हणजे हे शिलालेख देवनागरीत आहेत ते ही मराठी भाषेत.
घुमटीवर चंद्र सूर्य कोरलेले, त्याखालच्या चौकटीवर शिलालेख कोरलेला. वर काही मंगलवचने तर खालच्या बाजूस अभद्र वचने कोरलेली. व त्या खाली अजून एक शिल्प कोरलेले. त्या शिल्पात स्त्रीचा गाढवाबरोबर किंवा हत्तीबरोबर संकर दाखवलेला. हे गाढव शिल्प म्हणजे गधेगाळ व जिथे हत्ती असेल ते हत्तीगाळ.
काही वेळा ह्या असभ्य शिल्पांबरोबरच वरच्या बाजूस शिवलिंगाची पूजेचे शिल्प पण कोरले गेले आहे.
स्त्री कोंकणा चक्री- वर्ती। स्त्री केसीदेवराय।
महाप्रधा- न भइर्जु सेणुई तसीमीनी काले प्रव्रतमने।
सकु संवतु: ९३४ प्रधा- वी सवसरे: अधीकू दीवे सुक्रे बौ- लु।
भइर्जुवे तथा बोडणा तथा नऊ कुवली अधोर्यु प्रधानु।
महालषु- मीची वआण। लुनया कचली ज-
कल्याण होवो. पश्चिम समुद्राधिपती श्री. कोकण चक्रवर्ती श्री. केसीदेवराय याचा महाप्रधान भइर्जू सेणुई याने शक संवत ९३४ प्रभव संवत्सर अधिक कृष्ण पक्ष शुक्रवार या दिवशी देवीच्या बोडणासाठी नऊ कुवली धान्य नेमून दिले. जगी सुख नांदो.
हे शासन कुणी भंग करील तेहाची माय गाढवे झबिजे
जो कोणी ह्या शिवलिंगाच्या पूजेचा अव्हेर करेल त्याची अशी अवस्था होईल असा ह्या शिल्पाचा अर्थ काढता येतो.
हे शिल्प शिलाहार झंझ राजाच्या कारकिर्दीत घडवले गेले असावे (साधारण १० वे शतक) कारण अमृतेश्वराच्या मंदिराचा कर्ताही तोच आहे. मंदिराशेजारीच काही वीरगळ पण आहेत.
षष्टिं वर्ष सहस्त्रानि विष्ठायां जायते कृमि: ||
१. कदंब भरूडदेव याचा सावरगाव लेख (इ.स. ११६४)
२. शिलाहार अपरादित्य याचा लोनाड लेख (मराठी)
३. शिलाहार अपरादित्य(द्वि.) याचा परळ लेख.
४. शिलाहार सोमेश्वरदेव याचा चांजे लेख( या लेखात शब्दरूपात गधेगाळ नसून शिल्परूपात आहे)
५. यादव रामचंद्र देव याचा पूर शिलालेख (इ.स. १२८५ फक्त शिल्परूपात)
६. यादव रामचंद्र देव याचा वेळापूर शिलालेख (इ.स. १२८५)
७. वेळूस शिलालेख (इ.स. १४०२)
९. शिलाहार राजा अनंतदेवाचा दिवेआगर शिलालेख(इ .स. १२५४)
१. प्राचीन मराठी कोरीव लेख’ व ‘मराठी वाङ्मयाचा इतिहास’ संपादक : डॉ. शं. गो. तुळपुळे
२. महाराष्ट्राच्या इतिहासाचे साक्षीदार -प्रा. कल्पना रायरीकर, डॉ. मंजिरी भालेराव.
Yaksha and Yakshi
https://www.khanacademy.org/humanities/art-asia/south-asia/x97ec695a:1000-b-c-e-500ce-indo-gangetic-plain/a/yaksha-and-yakshi
aksha - Yakshi, a journey from Sujata
It was in 1988, during my trip to attend a job interview that I first saw these sculptures. As guards of RBI in Delhi, these two tall and strong sculpture of yaksha and yakshi. It can intimidate anyone who walks past it with its stunning looks. Although during those early days in Delhi, the place was still strange to me, on my way back to home, I could not stop getting down from the bus near RBI to have a second look of these sculptures.
Later on, I learned from Lalit Kala academe library that these sculpture of yaksha and yakshi were drawn its inspiration from "Parkham yaksha" and "Besnagar yakshi". During those pre internet eras, there was no other way a computer professional like me could have accessed that information. Years later, in my study of Indian sculptural traditions and sculptors, I revisited the aesthetic constructions of Ram Kinker Baij's artworks and found a new narrative for these two wonderful works: Yaksha -Yakshini, the journey of Sujata and an artist's love.
Besnagar yakshi Parkham yaksha Manibadhra
3rd - 1st century BC 3rd- 1st century BC
![]() |
| Emperor Ashoka
tries to take Buddha's relics from nagas. Sanchi. Here again we can
see Sujata at second position from second pillar form right
Image courtesy : RBI,ASI and wiki |
http://essaynarendraraghunath.blogspot.com/2017/10/yaksha-yakshini-journey-from-sujath.html
The demi gods/ accessory deities or the Vyantara devatas
With the rise of the element of bhakti during the early stages of religious worship (Varuna is the first to have been portrayed as the Vedic moral god, associated with the concept of sin, faith, and divine forgiveness; thus sowing the seeds of bhakti in Indic religions), there were many changes in the religious outlook among the ancient Indians. As the concept of religion took a firmer shape and Indians turned more towards polytheism, there came to exist many sects and different schools of philosophical thoughts. The element of bhakti had long been present in India, starting almost with the dawn of civilization where people would offer devotion and homage to gods and goddesses of their choice. The Vedic gods, initially with different essential traits, later merged with other non Vedic sects, while at the same time there were the emergence of other newer sects that resulted from deification of various historical and semi historical personages of ancient India. These new developments had significant influences on the beliefs and religious practices of the ancient Indians. As these new sects developed and grew stronger some of the earlier folk gods and goddesses were relegated into secondary deities also known as Vyantara Devatas, who were made into accessory or attendant deities of the higher popular gods of these new sects, with some even turning into adversaries of the popular deities.

The Vyantara Devatas, as per the Jain literature, include names such as Pisacas, Bhutas, Rakshasas, Yaksas, Gandharvas, Kinnaras, Nagas, Kimpurushas, Mahoragas, and Asuras. Buddhist texts also have a list that include Yaksas, Devas, Nagas, Raksasas, Asuras, Gandharvas, Kinnaras, Mahoragas, Garudas. Hindu literature further adds names of Kumbandhas, Kabandhas, Danavas, Daityas, Siddhas, Sadhyas, Apsaras, Vidyadharas, Ganas, Pramathas, etc. Among these the Yakshas, Nagas, Apsaras, and Gandharvas occupy an important position in Hindu religious and other literary texts. This is evident from the first three lines of the mantra recited during tarpan and shraddha rites while giving offerings to the Pitrganas:
Deva Yaksastatha Naga Gandharvapsarasosurah|
Krurah Sarpah Suparnasca tarava Jihmagah Khagah
Vidyadhara Jaladharasthaivakasagaminah |
[ These three lines have named most of the Vyantara devatas —–> Devas, Yaksas, Nagas, Gandharvas, Apsaras, Asuras, Sarpas, Suparnas (garudas), Sacred trees, Jihmagas (sacred reptiles), Khagas (sacred birds), Vidyadharas, Jaladharas (sacred aquatic animals), Akashgamis (sadhyas and sidhhas]
Yakshas
Within the realms of the Indic religions, while the popular deities have their own sacred standing, some of the the demi gods or the Vyantara devatas such as the Yaksas, also occupy an important place within the same sacred space. As many other demi gods slowly wilted away, it is interesting to note that Yaksas held on to their core concept. The sectarian literature across the different religions with their clear bias tried their best to overshadow the importance of these demi gods, while the various religious systems made concerted efforts to remove and supersede the Yaksas. However, in this process large number of Yaksa related anecdotes entered the texts and scriptures, which with their uniformity in representation of these demi gods kept the concept and images intact. Thus, the dominance of the Yaksha cult of worship prevailed, which filtered into the various religious systems without any significant changes in its core concept. Starting their journey as a sublime divinity in the Vedas, to later being relegated to as Vyantara devtas of the wild and the forests, no other demi gods perhaps have seen such diverse role plays and such spectacular ups and downs. Iconographywise, the Yaksas are among the earliest iconic representations, hence have always been of great interest to scholars.

A look at the origin of the Yaksha shows that there are various theories on its etymology. According to Hillebrandt the word may have meant apparition or ghost (not necessarily magical, though Coomaraswamy had retained the word magical in his derivation); Rhys, Davids, and Stede refer to them in the context of Vedic literature as quick ray of light, perhaps swift creatures that change their abode quickly and at will ; while in Pali literature the word Yakkha means a creature to whom sacrifice is offered (derived from the word yaj and yajati, which means to sacrifice); additionally Coomarasway accepted Hillebrandt’s derivation that gave another possible meaning of the word, which was ‘to honour’ (from Vedic yaks in pra-yaks). Most of the scholars believe that the word Yaksha meant to move quickly towards or flash upon; a momentary flash of light flashing upon sight.


Whatever the root meaning of Yaksa may be, there is no doubt of its presence in the Vedic literature as a class of supernatural beings , which are distinctly different from the other Vedic gods. In the earliest texts a clear dual attitude is displayed towards the Yaksas: one of fear and distrust, and the other of honour and benevolence; the first attitude in all probability arises from a fear of non Vedic deities. The fear and distrust emotions are clear in many verses of the Rig Veda; such as in RV., IV, 3, 13 we read “Do not (O Agni) consort with the Yaksa (familiar spirit) of any smooth swindler, intriguing neighbour….” ; in RV., V, 70, 4 it is said “Let us not, O ye gods of great power, encounter a Yaksa“; and in RV., VII, 56, 16 yaksadrso it is “espying the Yaksa” (seen as an invisible enemy to what is being undertaken). In Kausika Sutra, 93, 3, where Yaksas are clubbed with other adbhutani creatures that are seen as a sign of ill-omen.

In context of the attitude of honour, we find that Atharva Veda, X, 7, 38, in reference to Varuna, Brahman or Prajapati as the supreme source of life states that, “A great Yaksa in the midst of the universe, reclining in concentrated-energy (tapas) on the back of the waters, therein are set whatever gods there be, like the branches of a tree about a trunk.” Here the significant aspect is the tree of life, which symbolically gets carried on to the later texts, where Yaksas are shown as guardians or spirits of vegetations. Water as the source of life, as first stated in the RV., X, 82, 5 “Prior to the sky, prior to this earth, prior to the living gods, what is that Germ which the waters held first and in which all the gods existed? The waters held that same Germ in which all the gods existed ; on the navel of the Unborn stood that in which all beings stood,” also gets carried forward in later iconography, where we see it as a constantly recurring art in the form of a lotus stem bearing leaves and flowers, supporting life in form of birds and animals, and often arising from the mouth or navel of a Yaksa. The position of the Yaksas is made further clear in another verse from the Atharva Veda VIII, 10, 28 where they (in reference to Kubera and his son Rajatanabhi) are called Punyajana or “sacred folk,” and also as Itarajana or “other folks”; and as their subsistence they are said to “milk” the power of concealment (tirodha) from Viraj (Universe). In later texts the words Punyajana and Itarajana are used as synonyms for the word Yaksa; while Kubera or Vaisravana is mentioned as the king of Yaksas (Yaksaraja, Yaksesa), who is also associated with wealth and riches as Dhanapati or Nidhipati. Yaksapati or Guhyapati Vaisravana is also referred to by Patanjali in his Mahabhasya many times, though he doesn’t use the more common name of Kubera. Pantanjali’s mentions of Yaksa murtis and shrines is backed up by similar references in early Buddhist and Jain texts, which have all been collected and mentioned in details by Coomaraswamy in his book Yaksas (Part I, from page 17 onwards). Mahabharata also tells us of famous Yakshini shrines at Rajagriha and Munjavata where daily prayers (naityaka) were held. Agnipurana tell us that Yaksha shrines, like the Kartikeya ones, should be built in the northern part of a township. Ramayana (VII. 104. 12-13) gives another story which tells us that among the Brahma created beings made for guarding the waters the ones that shouted Rakshamah or ‘let us guard’ became Rakshasas, while the ones that said Yakshamah or ‘let us eat’ became Yaksas. The later Puranas portray the Yaksas as gluttons ; hence likely this etymological derivation was made. The VayuPurana especially puts emphasis on the maleovalent nature of Yaksas (chapter LXIX), where it is said they are known to devour or drag the elders. The Sutras which generally mark the end of the Vedic literature hold content that show the transformation of Yaksas from being the early ambivalent god with characteristics that are both good and dreadful (demonic) to becoming one of the demi gods, a concept which then stayed on.

From the above image it is evident that the Vedic Yaksa is a mix of various attributes. He is mysterious, not definable (in 1 and 2), dreadful and not to be consorted with (3 and 4); yet he is also beautiful (5), and is honorific of Varuna (6). the ambivalence is clear here with attitudes varying from respect to distrust, and this stuck with this duality of nature of the Yaksas : malevolence and benevolence.

Iconography
In Hemdari’s Chaturvarga-Chintamani (Vol II, Vratakhanda), a later text, there is given a detailed description of the Yaksas : Tundila dvibhujah karyya nidhihastah madokatah Gadi Vaisravana [pot bellied, two armed, holding two nidhis in their hands, fierce owing to drunkennesss, their lord Vaisravana holds a club in his hand]. In this context, Hemadri mentions names of various Yaksas, which are Siddhartha, Manibhadra, Nandana, Kanduti, Sankha, Padma, Ramaka, Sumana, Pancaka, Maniman, etc., while their king is Dhanadhipa (Kubera). Many other texts also give descriptions of the Yaksas, primarily because their king Kubera is also considered as one of the Astadikpalas. As a directional god the general characteristics of the Kubera murtis show him as two armed (in rare instances he’s four armed), holding a club in his hand, has two nidhis with him (sankha and padma), has a man (mythical anthropomorphic type) or a lamb as his mount, he is pot bellied and long armed. In Vishnudharmottara there are some additional characteristics, such as, the northerner’s dress and armour (apicyavesa, kavach); four hands carrying a mace (r), a spear (r), jewel (l), and a pot (l); he has fangs and moustache; while his consort Riddhi sits on his left lap. However, during the early and medieval period when Kubera is seen as a directional god on the outer walls of a temple, he is shown as pot bellied and carrying a sack of treasure, or he is shown squeezing the neck of a mongoose who is throwing up jewels. He is shown seated on a lotus in ardhaparyanka pose, while the dangling leg rests on two jars that indicate the two nidhis (sankha and padma). Sometimes 8 jars are also shown, representing the Astanidhis: padma, mahapadma, makara, kacchap, munkunda, nila, nanda, and sankha.



Quite a number of Yaksa images from the Maurya Sunga (3rd to 1st c. BCE) period have been found, and a look at these Yaksa images (Parkham Yaksa, the Patna Yakshas, and the Manibhadra Yaksa) show clearly that the pot-bellied trait was a later development, which was from a text titled Mayasamgraha , based on which Hemadri wrote his Chaturvarga-Chintamani. These murtis are badly damaged with heads and hands missing, which makes it impossible to recognise any other characteristics.

The Parkham Yaksa is attired in Indian dress and shown wearing long waist and chest bands, necklace, broad breast band (graiveyaka-harabhari), and ear ornaments. With the hands absent it is now impossible to say if the hands were carrying any objects.
The Patna Yaksas are slightly different but wear the same Indian attire.



Manibhadra Yaksha wears a thinner waistband and chest bands, and there appears to be a scared thread worn in the upavita style, his left hands carries what appears like a pot or a purse or an encased treasure (nidhi), while his right broken hand looks to have held a yak tail. The original Yaksa pedestals, when found preserved, are high, and we find Patanjali mentioning about the raised pedestal of Vaisravana, (utthita asaka Vaisravanasya).

Female Yakshinis are seen both in Buddhism and Hinduism and like their male counterparts associated with vegetation, and show both benevolence and malevolence attributes.



References
Chanda, R,P. Four ancient Yaksa statues. J.D.L., Vol IV, 1921, pp. 47-84.
Coomaraswamy, A. Yaksas- Part 1. Smithsonian Institute, Washington DC, 1931.
Misra RN. Yaksha cult and iconography. Munshiram Manoharlal, New Delhi, 1981.
https://monidipa.net/2021/02/28/yaksha/
What do Ganas, Gandharvas, Mithuna Couples, and Dancing girls on temple walls tell us
When we embark on a circumambulation of a temple (pradakshina), our eyes come across many figures besides those of the gods and the goddesses. Among the ones we most frequently meet are the chubby ganas busy blowing into conch shells, or bearing heavy loads of the temple, or sometimes playing the musical instruments. Others that we cannot miss are the mithuna couples (erotic art), and beautiful apsaras (celestial dancers); while the Gandharvas (celestial musicians) and Vidyadharas (celestial figures that dispel ignorance with their sword of knowledge) make less frequent appearances. Quite often we also notice the motifs of a hamsa or a swan going around the temple walls, marching along like soldiers or sometimes even teasing the rotund ganas. As we look at these images repeated in almost all temples, the figures automatically turn into an integral part of the temple architecture, embedding themselves deep into our inner consciousness, so we accept them unquestioningly. Being a part of the temple walls, these figures or images also acquire a divinity of their own in the mind of a bhakt, as he or she completes the pradakshina with thoughts focused on the divine presence inside the garbagriha.

The Airy Spirits and Breath
Vidyadharas, Gandharvas, Apsaras, Ganas and Hamsas
According to the rules laid by Shilpa Shastra, certain murtis have their positions fixed on the temple walls, spread radially from the main deity stationed inside the garbagriha. Such murtis can be divided into two categories: the prasar-devtas, which are the various forms or aspects (rupa) of the main divinity residing inside the sanctum; and the ashta dikapalas or gods of the eight cardinal directions, whose places are fixed in predetermined niches/positions on the temple walls.
Between the fixed images there are spread various other celestial figures, such as the apsaras, gandharvas, etc., and among them the ones that amuse me the most are the little ganas. The ganas, as Kramrisch would let us know, are the imagery representations of air, which is one among the five essential elements that make a human body (panchamahabhutas- air, water, earth, fire, and ether ); and as we know, it is the air that summarily supports all our bodily movements. As India understands better through images, the temple stapahtis had given a body (an image) to Air and we see that in the form of ganas, which in a literal sense are mere quantities (gana when translated denotes a quantity). Shown as potbellied to make them appear full of air, the little fat airbags or ganas rush around lending a shoulder to a heavy structure, such as a pillar or the shikhara; or playing musical instruments; and sometime blowing into the conch-shell. Airy, full of life, yet in reality body less, the ganas are also a symbolic represention of the lightness of a mind in full concentration focused on becoming one with the Brahman or Paramatma.
The Apsaras, the Gandharvas, and the Vidyadharas represent airy spirits; their bodies made of airy substances that show the five attributes of air, such as running, jumping, stretching, bending, etc. Thus, we see Apsaras performing the heavenly dances in the city of Amaravati, while Gandharvas playing heavenly music there. The Vidyadharas who are not a part of the musical soirée are often depicted as flying alone, or sometimes with Apsaras. They soar lightly across, carrying the sword of knowledge, which they use to cut through clouds of ignorance. Despite the inevitable aggression of time or kaal that destroys everything, the vidyadharas with a determined detachment of mind, keep pursuing knowledge relentlessly.
The geese or swans that we often see marching on temple walls (they are rarely shown in flight) represent the breathing rhythm; or Ham-Sa; where HA is the sound of breath going out, and SA is the sound of air entering the body. The control of breath which is practiced during Pranayama, is an essential part of Yoga sadhana to attain the final liberation of the soul. According to Garuda Purana, a person at any time breathing normally is internally chanting the rhythmic mantra of Ha-M-sa: Ha-M-Sa. This breath, the essential seed of life, the pran-beeja, finds an imagery manifestation in the form of Ham-Sa. The Hamsa bird represents the union point of atma with paramatma, towards which fly all celestial airy spirits, such as the ganas, gandharvas, and the dancers (apsaras).






Surasundaris are a representation of the Sakti, or the passive primordial Energy. They form a part of the ‘avaran devtas,’ and belong to the air-world or atmosphere. These female figures are a manifestation of the great beauty of the Devi, who has for a moment has become conscious of her beauty and is sensing a deep pride in it, while feeling animated by her sudden passion. Hence, she is charming and alluring, expressing divine vitality.
Various forms of Sakti include the Apsaras (often also referred to as Suranganas), Yaksis also known as Salabhanjikas, and Natakas. Representing vitality and movement, the Apsaras denote atmospheric movements, while Yakshis/ Salabhanjikas denote foliage movements, and Natakas are bodily movements shown in the form of dancers.
Mithuna:
“Embracing Shiva as the Madhava creeper clasps the young Amra tree with his bosom like cluster of blossoms” – Yogavashishta, Nirvanaprakarana

Erotica or mithuna couples that we see carved on temple walls reflect a deeper underlying philosophy than just representing sensuous earthly pleasures. Deep in the throes of passion the mithuna couples represent the transition from a physical to the spiritual plane of consciousness, analogous to the walk from the mandapa to finally meet the divinity present within the temple embryo or garbhagriha. In the Vedas, we find the mention of four purusharaths or human life goals, and one among them is Kama or satisfying physical pleasure (the other three being Dharma, Artha, and Moksha). Mithuna sculptures on the temple walls pander to this ancient Hindu philosophy, which believes that yoga (spiritual exercise) and bhoga (physical pleasure) are the two paths that lead to moksha (final liberation). As Kramrisch explains, when a man is embraced by the woman he loves he becomes unaware of everything else, inside or outside; something similar happens when the spiritual being of a person is embraced by the all pervading Supreme Soul. In both instances he forgets everything else that is external or internal to his being. He is satiated, has nothing more to ask for, and becomes free from all pain, and one experiences unending happiness, a state of sadaa-sukham. Thus, mithuna becomes a reflection of the other purusharath: Moksha, where there is an union of two inseparable substances, the Purusha (essence or mind) and Prakriti (Sakti or energy); hence we find Shiva needs Sakti for the final release or moksha, the ultimate objective of life. Essentially, the mithuna couples are thus an imagery representation of that particular moment when an atma becomes one with the Paramatma, and enters a state of eternal bliss and ecstasy.
This form of ritual (used for mastering the third purusharath or kama through bhoga) is practiced in Tantric worship, and it is for this reason we find gods and ascetics also shown in mithuna postures in some temples. This form of krida or lila, however has nothing to do with human copulation that aims at procreation. The love sport of ascetics, which can be practiced only by sanyasis (who have already crossed the first two levels of sadhana), with a woman who willingly gives herself just as a “creeper lovingly embraces a tree.” This form of lila or krida has no connections to dharma, artha, or kama, and strictly aims at achieving the fourth purusharath, moksha. The Avadhuta (one of the highest among sanyasis in terms of metaphysical realisations, who is above all castes and social norms) doesn’t need this union with a woman. He is already one with the Supreme entity: the Brahman.
** There is another perspective or line of thought that believes the mithuna sculptures on temple walls represent just what it shows: mithuna; or in other words it just shows Kama (one among the four purusharths), and nothing more. A part of the daily life, it represents physical pleasure, which one must see to overcome earthly temptations before viewing the divinity present inside the garbagriha or sanctum. Keeping this perspective in mind, I will say that arguments on this topic can be unending without any convergence of ideas. Symbolism will perhaps depend to a certain extent on the viewer to interpret what he sees and what he wants to see. Speaking for myself, I will side with Kramrisch and choose to see mithuna sculptures as reflecting the moment of ecstasy, which one experiences with final liberation or Moksha, when the antaratma unites with the Paramatma to become one.

The prasara-devtas which are various forms of the main divinity inside the temple, guide and help us to focus on the Supreme Soul residing in the sanctum. On the other hand these semi divinities like the ganas, gandharvas, apsaras, vidyadharas, and the mithuna couples constantly remind us of our sole objective in life: to become one with the Paramatma and attain final liberation or moksha. Thus, from that perspective the temple with all its sculptures also turns into a point of union of the soul with the Supreme Soul; an imagery concept or a representation of ecstasy through final liberation or moksha.
Post Script: I hope to take up each of these celestial beings separately as a series in my next few posts. There are many more aspects that can be examined about the temple wall figures that I talked of here; stories of apsaras, gandharvas, and Vidyadharas that can be told from our historical epics; while adding many more photos to help understand better. In that context this post remains an introductory one.
References:
Tarun Chopra, 2016. Temples of India. Thompson Press, Delhi.
Stella Kramrisch, 2015. The Hindu temple. MBP Private Ltd, Delhi.















































































































































































.jpg)
.jpg)
.jpg)
.jpg)
.jpg)
.jpg)
.jpg)
.jpg)






















































No comments:
Post a Comment