जगाच्या पाठीवर कुठेही दिसणारी आणि सोलापुरचे नाव ठळकपणे मिरवणारी चादर त्याच्या अभिमानाचा विषय जरुर आहे, पण या लोकांना स्वतःची टिमकी वाजवण्याची सवयच नाही. एखाद्या अस्सल सोलापुरीपुढे तुम्ही या चादरींचं कितीही तुफान कौतुक केलत तरी, ‘हां, हाये ते’ असा एक अत्यंत तोकडा उल्लेख होइल व विषय संपेल. आणि उन्हाळ्याचं म्हणाल तर खर्या सोलापुरी माणसाला त्याचा अजिबात त्रास होत नाही. फारच उन झालं तर तो शांतपणे सगळी कामं सोडून घरात बसतो, टोप्या वगैरे घालणे इथं भ्याडपणाच समजतात.
प्रत्येक गावाचे काही मानबिंदु असतात ( मानबिंदु जितके जास्त तितकी गावाची मान लांब असा निकष लावला तर पुणे म्हणजे एक जिराफ आहे!). सोलापुरचे मानबिंदु दोन – एक तर ४२ च्या चळवळीत फासावर गेलेले चार हुतात्मे आणि दुसरे सिद्धरामेश्वर. स्वातंत्र्य चळवळीत मार्शल लॉ लागू झालेलं हे एकमेव गाव अस प्रत्येक सोलापुरी मुलाने लहानपणापासून एकलेलं असतं. त्यामुळे पुस्तकात लिहीलेला इतिहास हा आपल्या गावात घडला हे एक जोरदार फिलींग इथं सर्वांना असतं. यामुळेच की काय कुणास ठाउक, पण भांडखोरपणा इथे ठासून भरला आहे. दोन सोलापुरी मित्र जेव्हा कोठेही भेटतात तेव्हा प्रथम पोटात गुद्दे मारुन, ‘काsss बे माज आलायं का लई’ असं कानडी हेलात जोरदार स्वागत करतात. शारिरीक जवळीक ही यांच्या एटीकेट्सचा एक भाग आहे. राजकारणात मात्र या भांडखोरपणामुळे कुठलेच नेतृत्व वा पक्ष इथं एकदम सेटल झालयं असं होत नाही.
मुळात हे एक सर्वार्थाने ‘मल्टिकल्चरल’ गाव आहे. मराठी,कन्नड,तेलगू आणि सोलापुरी हिंदी (ही एक वेगळी भाषा आहे!) अशा चार भाषा, अनेक पंथ, आणि संस्क्रुती याची ही एक भेळ आहे. त्यामुळे नुसतं सोलापुरात राहतो ह्या वाक्याला काही अर्थ नाही, सोलापुरात कुठं? हे महत्वाचं. ही सगळी विसंवादी पात्र एकत्र राहण्यामागे बसवेश्वरांच्या समन्वयवादी शिकवणीचा मोठाच वाटा आहे.
सोलापुरी मराठीलाही बेळगावप्रमाणे कन्नड हेल आहे. पण त्यातला गोडवा? तेवढं सोडून बोला. फटके मारल्यासारखं बोलण्याची इथे पदधत आहे. उदा. अमेरिकेवरुन परतलेल्या मित्राला ‘काsss बे अमेरिकेला जौन बी काळंच की बेss तू’, या थाटात चहा पाजतील. अर्थात मनात काही वाईट भावना ठेउन हे मुळीच नसतं. नवीन माणसं असल्या बोलण्याने गांगरतात आणि सोलापुरकरांबद्दल गैरसमज करुन बसतात. इथल्या दुकानदारांचे मराठी आणि धंदा करायची पद्धत तर अवर्णनीय आहे. एक तर जास्त माल दाखवणं हा अपमान समजतात, दुकानात जर काही नसेल तर ते आख्या सोलपुरातच नाही हे पटवतात किंवा ‘बोंबेउन मागवलेय’ या आश्वासनावर बोळवण करतात. कुठल्याही नव्या गोष्टीने हे एक्साईट होत नाहीत, आणि कमीतकमी शब्दात कशाचेही ग्लॅमर घालवण्यात तज्ञ आहेत. आमचा एक नवीन लग्न झालेला मित्र हौसेने बायकोला घेउन रुम फ्रेशनर घ्यायला गेला. ‘ते मिस्ट आहे काय हो’ अशा नाजुक विचारण्यावर; ‘सिद्ध्या, ते धुरळा उडतयं ते दाखव म्याडमला’, या थाटात पार कचरा करुन मालक पोट खाजवायला मोकळे झाले!
सोलपुरी हिंदी ही कचाकचा भांडायसाठी जगातली अत्यंत पावरबाज भाषा. मराठी आणि हिंदी मधल्या ‘वेचक आणि वेधक’ शब्दांना सणसणीत कानडी फोडणी दिली की हा पदार्थ बनतो. सोलापुरात बेगमपेठ नावाचा भाग आहे. असं म्हणतात की औरंगझेबाने त्याच्या बेगमांना इथं ठेवलं होतं. यावर आमचे संशोधन असे की थोड्या दिवसांनी जेव्हा तो लढाया करुन परत आला तेंव्हा बेगमांचं हिंदी एकून त्याने हाय खाल्ली व त्यातच त्याचा अंत झाला!
खाण्याच्या बाबतीतही सोलपुरात बरीच सरमिसळ आहे. सोलापुरची खासियत म्हणजे शेंगादाण्याची जहाल चटणी आणि ज्वारीची भाकरी. हा पदार्थ जरी सर्व महाराष्ट्रात बनत असला तरी सोलापुरकरांची त्यावर मास्टरी आहे. इडली हा त्यांचा दुसरा वीक पॉईंट, अर्थातच इथे सीमाभागात असल्याचा प्रभाव स्पष्ट आहे. सोलपुरात कित्येक होटेल्स केवळ सकाळी काही तास इडली-चटणी विकतात आणि बाकी वेळा बंद.
सोलापुरकरांचा अत्यंत आवडता विरंगुळा म्हणजे चित्रपट. सिनेमाचे इतके प्रचंड वेड असलेले दुसरे गाव कुठेही नसेल. इथे सिनेमा बघायला पाल़कांची परवानगी घेतली जात नाही (नवीन बालसंगोपनाच्या मागे लागून हा प्रकार अलीकडे सुरु झाल्याचे ऐकीवात आहे. काय चाललय हे?). मल्टीप्लेक्स नाव ही कुणाला माहिती नसल्यापासुन ती इथे आहेत. त्यामुळे सिनेमाला जाउन तिकीट मिळालं नाही म्हणुन परत येणं इथं पाप समजतात. हा नाही तर तो, कोणतातरी बघायचाच. त्यामुळे सहसा कुठला सिनेमा इथं फ्लॉप होत नाही. मिथुन, अमिताभ इ. इ.च्या पडत्या काळात सोलापुरी जनतेने त्यांना उदंड सहारा दिला आहे. लोकसंख्येच्या मानाने इथे खुपच – म्हणजे जवळपास १५ – थेटर्स आहेत. त्यातले काही फक्त कन्नड किंवा तेलुगू सिनेमे दाखवतात आणि सगळेच चालतात. असं आहे म्हणुन थेटर्स स्वच्छ वगैरे अजिबात नाहीत, उलट मुतारी, घाम, पानाच्या पिचकार्या आणि उच्छ्वास यांचा मिळुन येणारा दरवळ नसेल तर सिलेमाचा फीलच येत नाही. पंखे कधितरीच चालतात आणि उकाडा तर कायमचाच म्हणुन लोक शर्ट काढून डोक्याला गुंडाळतात. आवडतं गाणं लागलं की तोच फिरवून नाचतात किंवा धासू डायलॉगला हवेत उडवतात. शांतपणे सिनेमा पाहणे एकदम नामंजूर. त्यामुळे पुण्यात पहिल्यांदा सिनेमा पाहताना माझी जाम गोची झाली होती. तिथे काय सगळेच समीक्षक, त्यामुळे विनोदी प्रसंगालाही लोक दातातल्या दातात हसत होते. मी हैराण. सतत बडबड करीत सिनेमा पाहिला तरचं त्याचे पैसे वसूल होतात यावर आमचा पूर्ण विश्वास आहे. जुन्या काळात मुगले आझमच्या प्रिंट्स वरातीतून आणण्यापासून रेफ्युजी रिलीज झाल्यावर बच्चनचा मुलगा आला म्हणुन आख्या थेटरला पेढे वाटण्यापर्यंत या मॅडनेसचे अनेक किस्से आहेत.
मला नक्की खात्री आहे की हा लेख वाचूनही, ‘काsss बे लई ल्ह्याय्लास की’ या शब्दात माझे ‘कौतुक’ होईलं, खांद्यावर जोरदार बुक्की बसेल आणि मग आम्ही इडली खायला मोकळे होऊ!
सोलापूर हे कापडगिरण्यांचे शहर म्हणून प्रसिद्ध होते. कापड उत्पादनास तेथे १८७७ साली प्रारंभ झाला. ‘सोलापूर स्पिनिंग अँड विव्हिंग मिल’ ही पहिली गिरणी. ती ‘जुनी मिल’ म्हणून प्रसिद्ध होती. त्या मिलमध्ये तेलगू भाषिक समाज त्यांच्या वस्त्र विणण्याच्या कौशल्याबद्दल नावाजला गेला. ‘जुनी मिल’ हे सोलापूरचे वैभव मानले जाई.
शेठ गोकुळदास मोरारजी हे तिचे मालक! त्यांनी त्या काळी वीजनिर्मितीसाठी मिलच्या आवारात मोठे हौद व विहिरी खोदून पॉवर हाऊसही बांधले. पूर्ण सोलापूरचे रस्ते त्या वीजेमुळे प्रकाशित झाले. मिल अठ्ठ्याऐंशी एकर क्षेत्रात वसली आहे. मिलची चिमणी तीनशेपंचवीस फूट उंच होती व ती आशिया खंडातील सर्वांत उंच चिमणी ठरली. दुस-या महायुद्धात सैनिकांच्या छावणीसाठी लागणारे तंबूचे कापड त्या मिलमधून तयार होत असे. नंतरच्या काळात सोलापुरात अनेक गिरण्या उभारल्या गेल्या.
‘नरसिंग गिरजी’ ही मिल मिळालेला नफा कामगारांना वाटत असे! त्या मिलच्या आवारात अडीचशे वर्षांहून अधिक जुने वडाचे झाड आहे, त्याचा बुंधा तब्बल पंधरा फूट रुंद आहे. त्याच आवारात पाउणशे वर्षांपूर्वीचे लाकडी देवघर आहे. त्यातील गणपतीची मूर्ती साडेसहा फूट उंच आहे. देवघराचे नक्षीकाम रेखीव आहे. एकशेपंधरा वर्षांनंतरही पाणी पुरवणारी चौकोनी दगडी विहीरही तेथेच आहे.
सोलापुरातील चाळी प्रसिद्ध आहेत. वीरचंदपूर चाळ १९४४ साली उभारली. तेथे चारशेअठ्ठ्याऐंशी घरे आहेत, तर एस.जी. वारद चाळीत तीनशेएक घरे आहेत.
कवी कुंजविहारी ऊर्फ हरिहर गुरुनाथ सलगरकर हे ‘लक्ष्मीविष्णू मिलमध्ये (१८९६ ते १९७८ )’ काम करत. लक्ष्मी विष्णू चाळीत घरे होती सातशेपन्नास. माधवराव आपटे यांनी ती मिल चालवायला १९६६ मध्ये घेतली. त्या काळी चाळीचे भाडे तीन रुपये महिना असे (तेव्हा पाव दहा पैशांला व बुंदी पंधरा पैशांला मिळे). चाळींची डागडुजी चाळींचे मालकच करत.
शहराला हिप्परगा तलावातून पाणीपुरवठा होई. म्हणून अनेक विहिरी खोदल्या गेल्या. त्यांपैकी साखरपेठमधील विहिरीला गोड पाणी लागले. म्हणून त्या पेठेला साखरपेठ म्हणत. तेथेच सिद्धेरामेश्वरांच्या जन्माचा उल्लेख आहे. तेथेच हिंगलाजमाता मंदिर आहे. तिचे उगमस्थान बलुचिस्तानात असल्याचे दाखले मिळतात. त्याच भागात लाकडाचा बाजार होता. त्याला तेलगुमध्ये ‘कट्टेलसंता’ म्हणतात. त्या नावाचे प्रसृतिगृह त्र्याऐंशी वर्षांनंतरही कार्यरत आहे. त्याच पेठेतील पद्मा टॉकीज 1946 पासून टिकून आहे.
त्या पेठेतील सोमा कुटुंबीय हातमागावर सुंदर व सुबक कलाकृती विणतात व त्यांनी बनवलेल्या वॉलहँगिंगना जगभरात मागणी आहे. ते कुटुंब १९६५ पासून वॉलहँगिंगच्या व्यवसायात आहे. साखरपेठेत राहणारे आणखी एक नाव आहे व्यंकटेश कोटा! भुयारी गटारे व ड्रेनेज साफ करणारी ‘व्यंकटगिरी यंत्रे’ बनवणारे व्यंकटेश कोटा फक्त पाचवीपर्यंत शिकलेले आहेत. पण त्यांच्या यंत्रांना अमेरिका, इंग्लंड व युरोपमध्ये मागणी आहे. त्यांनी त्यांच्या वयाच्या पंधराव्या वर्षी ते यंत्र बनवले. त्यांचा कारखाना सोलापूर-मंगळवेढा रस्त्यावर देगाव येथे आहे.
तुकाराम महाराज जोशी यांना वैष्णव संप्रदायाचे कुलगुरू मानतात. त्यांचा जन्म १९१० सालचा. त्यांनी पंढरपूरला दिंडी नेण्याची सुरुवात सत्तर वर्षांपूर्वी केली. ती प्रथा अजूनही सुरू आहे. त्यांनी 1जानेवारी १९९५ रोजी रविवार पेठेत जिवंत समाधी घेतली. त्यांचा समाधी सोहळा मोठ्या प्रमाणावर साजरा होतो. पद्मशाली समाज म्हणजे विणकर व विड्या वळणारे! तो समाज १८४५ मध्ये सोलापुरात आला.
त्या समाजाच्या ‘सेवा मंडळा’ला एकशेचार वर्षे झाली. ती संस्था वड्डेपल्ली येथे आहे. त्याच पद्मशालींच्या 1943 मध्ये स्थापन झालेल्या कुचन प्रशालेच्या बावीस संस्था शिक्षणक्षेत्रात मोलाची कामगिरी बजावत आहेत. ‘दयानंद अँग्लो वैदिक शिक्षण’ संस्थेची स्थापना १९४० साली आर्य समाजाच्या ( १८८६ साली लाहोरमध्ये आर्य समाजाची स्थापना झाली) मंडळींनी केली. देशभरात त्या संस्थेच्या सातशेपन्नास शाखा असून महाराष्ट्रात एकोणीस आहेत. माजी पंतप्रधान मनमोहनसिंग व माजी गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे हे ‘दयानंदचे’च (अनुक्रमे लाहोर व सोलापूर) विद्यार्थी. सोलापुरातील रविवार पेठेत त्रेसष्ट एकर जागेत उभे असलेले ‘दयानंद महाविद्यालय’ होतकरू विद्यार्थ्यांसाठी शिक्षणाची पंढरीच आहे. ते गेली त्र्याहत्तर वर्षे कार्यरत आहे. दयानंदचे विद्यार्थी – अटलबिहारी वाजपेयी, शहीद भगतसिंग, राजगुरू, लालकृष्ण अडवाणी, सुषमा स्वराज, क्रिकेटपटू कपिलदेव व महेंद्रसिंग धोनी, शाहरुख खान, गायक जगजितसिंग, डॉ. यु.म. पठाण, जब्बार पटेल, डॉ. अरुण टिकेकर, मारुती चित्तमपल्ली व अनेक आयएएस अधिकारी व आंतरराष्ट्रीय खेळाडू. तेथे माजी राष्ट्रपती डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन, विंदा करंदीकर, वसंत कानेटकर, महाकवी द.रा. बेंद्रे इत्यादी प्राध्यापकांनी विद्यार्थ्यांना शिकवले आहे.
सोलापूर महामार्गावरील मुळेगाव येथे १९३३ साली विभागीय कृषी संशोधन केंद्राचे कार्य सुरू झाले. तेथे संशोधलेले विविध प्रयोग कोरडवाहू शेतीसाठी वरदान ठरले आहेत. तसेच, तेथे संशोधित झालेली नाना प्रकारची अवजारे व यंत्रे यांना राज्यभर ख्याती आहे. तेथे शास्त्रज्ञ एस.व्ही. कानिटकर यांच्या नावाने संग्रहालय उभारले गेले आहे.
सोलापुरात सुमारे पन्नास हजार हातमाग १९८४ साली होते. त्या कुटिरोद्योगात मिळालेला नफा व्यापारी व दलाल यांनाच मिळायचा म्हणून 1949 साली तेथील रविवारपेठेत ‘उद्योग बँक’ उभारली गेली. ती २००४ सालापर्यंत कार्यरत होती व नंतर बंद पडली. त्या बँकेने १९६६ साली व्याख्यानमाला सुरू केली. त्या व्याख्यानमालेचा नावलौकिक पुण्याच्या वसंत व्याख्यानमालेनंतर आहे. ती तेलगू भाषिकांकडून झालेली मराठीची सेवा आहे.
वडार समाज – ओरिसा प्रांतातून आलेला वडार समाज पूर्वी बांधकामावर दगड फोडण्याचे काम करत असे. त्यांची रविवार पेठेत तीन हजारांची वस्ती आहे. त्यांनी पारंपरिक व्यवसायाबरोबर सोलापूरच्या कला, क्रीडा, सांस्कृतिक व सामाजिक क्षेत्रांत मोठ्या प्रमाणावर योगदान दिले आहे. त्यांनी त्यांचा जम अनेक मंदिरे, कळसांची कलाकुसर व रंगरंगोटीतही बसवला आहे. सामुदायिक विवाह हे त्यांचे वैशिष्ट्य आहे. त्यांच्यामधील सुशिक्षितांचे प्रमाणही वाढत आहे.
सोळा गावांचे मिळून सोलापूर झाल्याचे सांगितले जाते. शहराच्या प्रत्येक भागाने त्याचे वैशिष्ट्य जपले आहे. आता जो संयुक्त चौक आहे, त्याला पूर्वी बारा तोटी चौक म्हणत. त्या बाजूला बारा तोटी नळ होते व चार बाजूंला चार पेठा होत्या. तेथेच तिप्पण्णा हिब्बारे यांनी पिठाची गिरणी शंभर वर्षांपूर्वी सुरू केली. ती चालू आहे. तर १८२४ साली स्थापन झालेले ‘करंजकर विद्यालय’ही पावणेदोनशे वर्षांनंतर सुरू आहे. तेथे पहिली ते सातवीपर्यंत वर्ग असून सातशेदहा विद्यार्थी आहेत. त्या विद्यालयात सतराव्या शतकापासूनची दुर्मीळ ग्रंथसंपदा – नकाशे, शब्दकोश, जुन्या कादंबऱ्या व पुस्तके – आहे.
चाटी गल्ली व फलटण गल्ली या परिसरात कापड व्यापार आहे (मंगळवार पेठ). तेथील लक्ष्मीनारायण मंदिरात एका वर्षातील दोनशे दिवस विविध उत्सव सुरू असतात. जवळच, सत्यनारायण मंदिर आहे. (ते दोनशे वर्षांपूर्वीचे, महाराष्ट्रातील सत्यनारायणाचे दुसरे मंदिर). उत्तम वास्तुकलेचे नमुने असलेले अनेक जुने वाडे मंगळवार पेठेत पाहायला मिळतात. शिसवी लाकडात केलेली नक्षी असलेला काडादी वाडा, सत्तावीसशे फुटांचा तीन मजली येरटे वाडा, दीडशे वर्षांचा सोमशेट्टी वाडा, अब्दुलपुरकर वाडा… राठी, बसवंती, सोमाणी यांचे वाडेही जुने आहेत.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या अस्थी ठेवलेली ‘प्रेरणा भूमी, बुद्धविहार’ बुधवार पेठेत आहे. शंभर वर्षांची श्राविका संस्था; तसेच, दमाणी प्रशाला, जैन गुरुकुल संकूल, सोलापूर एज्युकेशन सोसायटी अशा नामवंत शिक्षण संस्था बुधवार पेठेतच आहेत. त्याच पेठेत श्रमिकांना रोजीरोटी देणारे विडी उद्योग आहेत.
लोकमान्य टिळकांना सार्वजनिक गणेशोत्सवाची संकल्पना ज्या ‘आजोबा गणपती’वरून सुचली ते मंदिर शुक्रवार पेठेत आहे. तेथे सार्वजनिक गणेशोत्सव इसवी सन १८८५ पासून साजरा होतो. टिळक यांनी पुण्यातील सार्वजनिक गणपती १८९३ मध्ये सुरू केला, त्याआधी आठ वर्षे! तो गणपती इको फ्रेंडली साहित्य वापरून बनवला गेला आहे व ती मूर्ती एकशेअठ्ठावीस वर्षांची जुनी आहे याचे आश्चर्य वाटते. अनेक मान्यवरांनी त्या मंदिरास भेट दिली असून तो मानाचा गणपती आहे. त्याच पेठेत गेली शंभर वर्षे दूध बाजार चालतो. ‘सोलापूर समाचार’ हे साप्ताहिक १८८५ साली त्याच भागात सुरू झाले व त्याचे दैनिकात रूपांतर १९३० मध्ये झाले, पण ते १९८८ साली बंद पडले. त्याच जक्कल कुटुंबीयांचे ‘विश्व समाचार (१९७६ )’ मात्र सुरू आहे. त्याच भागात शंभर वर्षांपासून ‘भांडे’ गल्ली आहे. सर्व धातूंची भांडी, पलंग, कपाटे, ट्रंका तेथे मिळतात.
वड, लिंब व पिंपळ या वृक्षांचा संगम असलेले शहरातील एकमेव ठिकाण शनिवार पेठेत विठ्ठल-रुक्मिणी मंदिरात पाहण्यास मिळते.
भवानी पेठेतील कृषी विद्यालयात आधुनिक शेतीचे शिक्षण मिळते. त्याचे क्षेत्र साडेअकरा एकर आहे. ते विद्यालय गेली सहासष्ट वर्षे सोलापूरला वरदान ठरले आहे.
सोलापूरकरांचे आणखी एक आराध्य दैवत असलेली रूपाभवानी, तिचे मंदिरही भवानी पेठेत आहे. ती मूर्ती तुळजापूरच्या तुळजाभवानीशी मिळतीजुळती असल्याने ती रुपाभवानी! नवरात्रात तेथे मोठ्या प्रमाणात उत्सव साजरा होतो. दीड एकर जागेत सभामंडप व मंदिर परिसर सुशोभित करण्यात आला आहे. शहरातील जोडभावी पेठेत सर्व काही मिळते. मंगळवार बाजारात भाजीपाला, फळे, दूध, तूप, इतर खाद्यपदार्थ, कपडे, अवजारे, इलेक्ट्रॉनिक्स वस्तू, धान्य हे सर्व वाजवी भावात मिळते.
हातमागावर साड्या विणणारी पेठ म्हणजे आंध्र-भद्रावती/दाजी पेठ. तेथे तेलगू समाज इरकली, जपानी, मोठी किनार, श्यामसुंदर किनार अशा नावाने प्रसिद्ध असलेल्या साड्या विणत असे. आता आंध्र-भद्रावती पेठ ही यल्लमा पेठ म्हणून ओळखली जाते. दाजी पेठेत दाक्षिणात्य पद्धतीचे सुंदर व्यंकटेश्वर मंदिर, म्हणजे तिरुपती बालाजीची प्रतिकृती आहे. जवळ, तितकेच सुंदर राममंदिर आहे. पाच्छा पेठेतही दाक्षिणात्य बांधकामाचा उत्कृष्ट नमुना असलेले कालिकादेवी मंदिर आहे. त्याच पेठेत नऊवारी लुगडी व सतरंज्या बनवणारे हातमाग होते.
बेगम पेठ – सोलापुरवर औरंगजेबाचे वर्चस्व असताना तो ब्रम्हपुरी (ता. मंगळवेढा) येथे सात वर्षे राहिला. तो जुम्मा आणि ईद नमाजासाठी सोलापूरच्या जामे मशिदीत जात असे. तो खुद्द सोलापुरातही तेरा महिने राहिला होता. त्याची फौज बेगमपेठेत असायची. त्याच्याबरोबर त्याची चौथी पत्नी (बेगम) उदयपुरी व मुलगी झीनतल्लीसा होती. त्या वेळपासूनचे बेगमपुरा नंतर बेगम पेठ झाले आहे. ती व्यापा-यांची व कष्टक-यांची पेठ म्हणून प्रसिद्ध आहे.
सोलापूरच्या सिद्धेश्वर पेठेतील सिद्धेश्वर मंदिर, मार्कंडेय मंदिरही प्रसिद्ध आहेत. त्या पेठेत अनेक कलावंत झाले. नाट्य-कलागुणांची जणू तेथे मांदियाळी होती.
दीडशे वर्षे कार्यरत असलेले ‘हिराचंद नेमचंद वाचनालय’ हे सोलापूरची शान आहे. शहरवासीयांची बौद्धिक भूक भागवण्याचे काम ते वाचनालय करते. त्याचे तीन हजार सभासद आहेत. ते वाचनालय मुरारजी पेठेत आहे. वाचनसंस्कृतीबरोबर अनेक कार्यक्रमही त्यांच्या ‘टिळक स्मारक सभागृहा’त होत असतात. त्याच पेठेत राघवेंद्र स्वामी मठ आहे व तेथे हजारो भक्तगण अध्यात्माची परंपरा जोपासत आहेत.
साठ फुट खोल व तीस फुटापर्यंत पाय-या असलेली, संपूर्ण दगडी बांधकाम असलेली गंगा विहीर ही नवी पेठचे वैशिष्ट्य आहे. त्याच नवी पेठचे अजून एक वैशिष्ट्य म्हणजे ‘नामदेव चिवडा’! तो त्याची ओळख गेली एकशेचाळीस वर्षे टिकवून आहे. त्याच पेठेत छत्रपतींच्या कार्याची ओळख सांगणारे ‘शिवस्मारक’ एक एकर चौदा गुंठे जागेवर उभे राहिले आहे. राष्ट्रसेवेची प्रेरणा देणा-या त्या कार्यकेंद्रात विविध व्याख्याने, प्रवचने, स्पर्धा होत असतात. एक संग्रहालयही तेथे आहे. तसेच व्यायामशाळा, भौतिक चिकित्सा केंद्र आहे.
गावठाण भाग विकसित करून बनवलेली ती ही नवी पेठ! सोलापूरचे वैभव असलेला भुईकोट किल्ला त्याच पेठेत आहे. तो १३५८8 ते १३७५ या दरम्यान बांधला गेला असावा. तेथे आतमध्ये बाग बनवली आहे, अठराव्या शतकातील दोन तोफा आहेत. देवालयासारखी एक वास्तू असून त्यावरील शिल्पकला हिंदू राजांनी केलेली आहे. त्या मंदिरातील शिवलिंग मल्लिकार्जुन मंदिरात आणले असावे असे सांगण्यात येते.
ज्योतिषशास्त्राला पंचांगाचा आधार देणारे कै. ल.गो. दाते यांनी १९१६-१७ मध्ये दाते पंचांग प्रसिद्ध केले. त्यांनी गणितातील स्थुलता घालवून अधिक सूक्ष्म असे दृक्गणित स्वीकारले व पूर्वीची ‘घटी-पळे’ देणारी वेळ रद्द करून घड्याळाच्या वेळा दिल्याने ते लोकप्रिय झाले. दाते पंचांगकर्ते लोकांकडून आलेल्या प्रश्नांचे निरसन करतात. त्यांची पंचांगे १९३९ पासून पाच पाच वर्षांच्या संचात उपलब्ध झाल्याने अभ्यासकांची सोय झाली आहे. त्यांचे स्वत:चे गणेशमंदिरही आहे.
सोलापूरच्या दक्षिण कसबा पेठेतील ‘सुंद्री’ वादन म्हणजे सोलापूरची शान आहे. सुंद्री म्हणजे आकाराने छोटी सनई. सुंद्रीवादन कलेला जाधव घराणे सात पिढ्यांपासून जोपासत आहेत. अक्कलकोटच्या संस्थानचे राजा फत्तेसिंह यांनी ते वादन ऐकून तिला ‘सुंद्री’ हे नाव दिले. ती खैर वा सिसम लाकडाची बनवतात. लांबी अकरा इंच, त्यावर नऊ स्वररंध्रे असून वरील भाग निमुळता असतो. खालील भाग चंबूसारखा व मुखभागी ताडाच्या पानाची पत्ती असते. सुंद्रीवादनाला ‘खुर्दक’ या तालवाद्याची साथ असते.
प्रवचनकार, किर्तनकार, कविवर व लोकशाहीर अशा अनेक बिरुदावलीने अजरामर ठरलेले राम जोशी हे उत्तर कसब्यात जन्माला आले. ते आठशे वर्षांची परंपरा असलेल्या जोशी घराण्यात १७६० वा १७६२ साली जन्मले. त्यांच्या घराण्याकडे पूर्वापार ग्रामजोशी हे मानाचे पद होते. ते आता त्यांच्या सहाव्या पिढीकडे आहे. – सुमारे एक हजार वर्षांपासूनचा देशमुखवाडा दक्षिण कसब्यात आहे. सिद्धरामेश्वरांचा आठशे वर्षांपूर्वीचा योगदंड त्या वाड्यात पुजला जातो.
सोळाव्या शतकातील मल्लिकार्जुनाचे हेमाडपंती मंदिर उत्तर कसबापेठेत आहे. तेथे दीडशे फूट खोलीची प्राचीन विहीर स्वच्छ पाण्याने भरलेली असते. त्या भागातील पत्रा तालीम प्रसिद्ध आहे.
हरिभाई देवकरण प्रशाला १९१८ साली स्थापन झाली. ती शतकाच्या उंबरठ्यावर आहे. तर त्याच रेल्वे लाईन भागातील दुसरी नामवंत जुनी शाळा म्हणजे सोलापूर हायस्कूल! त्याच्या नंतर नॉर्थकोर्ट ही प्रशाला स्थापन झाली, १८५५ साली! तब्बल एकशेसाठ वर्षांची ती प्रशाला होती सोलापुरातील पहिले हायस्कूल! संपूर्ण इमारत दगडी बांधणीची असून इतर अभ्यासक्रमांसाठी आणखी सहा इमारती बांधल्या गेल्या आहेत. त्या प्रशालेतील नामवंत विद्यार्थी आहेत – डॉ. द्वारकानाथ कोटणीस, शिल्पकार रावबहाद्दर मुळे, स्वामी रामानंदतीर्थ, शंतनुराव किर्लोस्कर, वालचंद हिराचंद, शेठ गुलाबचंद व रतनचंद हिराचंद, कवी कुंजविहारी, सोलापूरचे ‘विश्वकर्मा’ – नानासाहेब चक्रदेव, माजी नगराध्यक्ष – बाबासाहेब वारद, सर अब्दुल लतिफ, व्ही. आर. कुळकर्णी, मारुती चित्तमपल्ली, लक्ष्मी उद्योगसमूहाचे जयकुमार पाटील इत्यादी. त्या नामवंत शिक्षणसंस्थांप्रमाणेच गेल्या एकशेतेरा वर्षांपासून कार्यरत असलेले पहिले ‘महिला अध्यापक विद्यालय’ असलेले ‘मेरी बोर्डिंग विद्यालय’ व ‘वोरोनीको प्रशाला’ अतिशय प्रसिद्ध आहे.

पर्यटनाच्या दृष्टीने सोलापूरला विशेष महत्त्व आहे. वैभवशाली परंपरा असलेला येथील भुईकोट किल्ला हे पर्यटकांचे प्रमुख आकर्षण आहे. येथील सिद्धेश्वर मंदिर विशेष प्रसिद्ध असून, प्रतिवर्षी मार्गशीर्ष-पौष या महिन्यांदरम्यान येथे मोठी जत्रा भरते. त्याशिवाय येथील मल्लिकार्जुन मंदिर, जुने राम मंदिर, विठ्ठल मंदिर, रूपाभवानी, काळजापूर, आदिनाथ मंदिर, मारुती मंदिर, जैन मंदिर, सिद्धरामेश्वराची समाधी, शुभराय मठ, प्रॉटेस्टंट चर्च, द्वारकानाथ कोटणीस यांचे स्मारक इत्यादी उल्लेखनीय आहेत. सिद्धेश्वर तलाव, धर्मवीर संभाजी जलाशय (कंबर तलाव) व त्याचा निसर्गरम्य परिसर, स्मृती वन, हुतात्मा बाग, रेवणसिद्धेश्वर प्राणिसंग्रहालय, हिप्परण्याचा एकरूख तलाव ही येथील प्रमुख पर्यटनस्थळे आहेत. सोलापूर-विजापूर महामार्गावर, सोलापूरपासून ५ किमी. अंतरावर वनविभागाच्या वतीने १२५ हे. परिसरात विकसित केलेला सिद्धेश्वर वनविहार प्रकल्पसुद्धा पर्यटनाच्या दृष्टीने महत्त्वाचा आहे. सोलापूर शहरापासून जवळपास तुळजापूर (उस्मानाबाद जिल्हा), अक्कलकोट, विजापूर (कर्नाटक राज्य), नान्नज अभयारण्य इत्यादी धार्मिक व प्रेक्षणीय स्थळे असून ती पाहण्यासाठी बरेच पर्यटक सोलापुरात राहतात. त्यामुळे सोलापुरात तारांकित हॉटेलांपासून धर्मशाळेपर्यंत राहण्याच्या चांगल्या सुविधा आहेत.
सोलापुरचा इतिहास :-
संस्कृत साहित्यातील माहितीनुसार ऋषी अगस्ती हे विंध्य पर्वत ओलांडून गोदावरी नदीकाठी वस्ती करणारे पहिले आर्य मानले जातात. आर्यांच्या अगोदर दाट जंगलाने दक्षिणेकडचा भाग व्यापलेला होता. अशा प्रदेशात आर्य वस्ती करुन रहात होते.त्यांच्या प्रदेशाला 'जनस्थान' असे म्हणत. त्यात सोलापुर जिल्ह्याचाही समावेश होता. या भागातच निरनिराळ्या अर्य ऋषींच्या वसाहती होत्या, असे रामायणातील उल्लेखावरुन स्पष्ट होते. उत्तर रामचरित्रात भवभुतीने 'दंडकारण्य' दक्षिणेकडे गोदावरी नदीच्या जनस्थानाकडे पसरले आहे असा उल्लेख केला आहे. दक्षिण भारतातील मध्य भाग हा अनेक प्रदेशात विभागला गेला असून त्याला वेगवेगळी नावे दिलेली होती. गोदावरीच्या उत्तरेकडील भागाला 'मुल्क' असे नाव असून त्याची राजधानी प्रतिष्ठाण म्हणजे आजचे पैठण होती. मुल्कच्या उत्तरेस 'कृषीका' हा प्रदेश होता. गोदावरीच्या दक्षिणेला अश्मक व मुरुळ हे प्रदेश होते. त्या प्रदेशाचा कुंतल प्रदेशात समावेश करण्यात आला होता. कुंतलचा विस्तार दक्षिणेस मोठ्या प्रमाणात झाला होता. नंतरच्या काळात कुंतल प्रदेशाला कनारसे म्हणून ओळखले जाउ लागले. सुरवातीचे बदामीचे चालुक्य आणि नंतरच्या काळातील कल्याणीचे चालुक्य यांची राजधानी कनारसे प्रदेशातच होती. त्यालाच कुंतलेश्वर म्हणून ओळखले जात होते.
पण नवीन अध्ययनानुसार सोलापूर हे नाव सोळा गावांच्या एकत्रिकरणाने बनलेले नाही. शिवयोगी श्री सिद्धेश्वर लिखित शिलालेखानुसार सोन्नलगे असे संबोधले जायचे. कालांतराने सोन्नलगेचे सोन्नलगी असे रूपांतर झाले. आणि यादव वंशापर्यंत सोलापूरचे संबोधन सोन्नलगी असे होते. मोहोळ तालुक्यातील कामती येथे सापडलेल्या शके १२३८ च्या संस्कृत शिलालेखानुसार सोलापूर नगरीला सोनलपूर असे संबोधले जातात. सोलापूर भुईकोट किल्ल्यात सापडलेल्या एका शिलालेखानुसार सोनलपूर असा उल्लेख होतो. तर त्याच किल्ल्यातील दुसऱ्या भिंतीवर सापडलेल्या शिलालेखानुसार या नगरीचा उल्लेख संदलपूर असे केलेले आहे.
मुस्लिम काळात या शहराला सोनलपूर असे संबोधण्यात येत होते. काळाच्या ओघात सोनलपूर मधील 'न' गाळला जाऊन सोलपूर नंतर सोलापूर असे नाव प्रचलित झाले असावे. त्यानंतर ब्रिटिश शासनांनी सोलापूर ऐवजी शोलापूर असे उच्च्यार कायम केले.
मराठ्यांनी सोलापूर जिल्ह्यात अनेक ठिकाणी आक्रमण केले, सोलापूरचा भुईकोट किल्ला हे विजापूरकर आणी मुघल याच्यातील १६६८ च्या तहानुसार मुघलांना मिळाला होता या कालावधीत मोगलनी आपले तोफखाना व दारूगोळा व टाकसांळ सोलापूरच्या भुईकोट किल्ला सुरु केले १६८० मध्य खानजहान बहादूरच्या आज्ञेनुसार सोलापूरच्या भुईकोट किल्लातील २५ तोफा दुसरीकडे नेण्याची जबाबदारी अली आगामी जगतसिंग हाडा आणि राजा जसवंतसिगं बुंदेला यांच्यावर सोपविण्यात आले होते.
या २५ तोफा मराठ्यांनी हस्तगत केल्या. अली, जगतसिगं हाडा व जसवतसिग यांच्यावर तोफा नेण्याच्या कामात दिरंगाई केली म्हणून मनसब कमी करून त्यांच्याकडून नुकसान भरपाई घेण्यात आले. यावेळी सन १६८० च्या डिसेंबर महिन्यात संभाजीराजे जातीने सोलापूरजवळ गेले होते. त्याचा हेतू कदाचित मुलखाची पाहणी करण्याची असावा. रणमस्तखान व इतर मुघल अधिकारीनी त्याच्या बरोबर मुकाबला केला.त्यात छत्रपती संभाजी महाराज व मोगल व छत्रपती संभाजी महाराज यांच्या पक्षाचे लोक जखमी झाले…
तसेच याचा प्रदेशातून मोगली सैन्यासाठी रसद व कुमक (धान्य साम्रगी) येत असल्याचे नोंदी उपलब्ध आहेत त्या मोगलांना मिळू नयेत म्हणून याभागात मराठे सतत वावरातुन दिसतात.
पावसाने रुसणे हे सोलापुरवासीयांसाठी नवे नाही. त्यामुळे देवाजीची करुणा भाकण्याची प्रवृत्ती सोलापुरकरात अधीक. सोन्नलगी गावात रहाणारा, मोर्डीमुइया आणि सुग्गलदेवी यांना योगिराज श्री रेवणसिध्द यांच्या आशिर्वादाने पुत्रप्राप्ती झाली. या पुण्यप्रतापी सिध्दपुरुषाचे नाव ठेवले गेले श्री सिध्देश्वर उर्फ धुळीमहांकाळ. धुळीमहांकाळ हे कुलदैवताचे नाव. हा सिध्दपुरुष जन्मला आणि सोलापुरची शेते पिकू लागली. भरभराटीची चिन्हे दिसू लागली. या सिध्दपुरुषाचा मुक्काम आज ज्या ठिकाणी देउळ आहे त्याठिकाणीच आहे. सिध्देश्वर पुराणात त्यांच्या चमत्काराच्या अनेक कथा सांगितल्या जातात. एके दिवशी त्यांनी हातात कुदळ घेतली आणि खणावयास सुरवात केली. त्यांच्या पाठोपाठ त्यांच्या शिष्यांनीही त्यांचे अनुकरण केले. थोड्याच काळात तिथे पाणी लागले आणि बघता बघता त्या परिसराचे रुपांतर तलावात झाले. श्री सिध्देश्वरांनी समाधी घेण्यापुर्वी शिष्यांना, भक्तांना सांगितले, 'मी हे गाव सोडून जाणार नाही. तोपर्यंत या गावाची भरभराट आहे असे समजा. तुम्हीही हा गाव सोडून जाउ नका. कितीही आपत्ती आली तरीही'. हा काळ इ.स. ११२७ ते ११३७ चा. सिध्देश्वर मंदीर हे बाराव्या शतकात उभारले गेले तर त्यानंतर दोन शतकानंतर सोलापुरचा भुईकोट किल्ला बांधला गेला.
मौर्य काळ आणि सोलापूर ( इ.स.पु. ३२२ ते इसपू १८७ )
मौर्य साम्राज्यात कुंतल प्रदेशाचा समावेश होत होता. मौर्य सम्राट अशोकच्या धम्ममहापात्राने चंद्रपूर जिल्ह्यात देवटेक येथे कोरलेले आलेख व दक्षिणेस इरागुडी आणि राजुलमंदागिरी या कर्नल जिल्ह्यातील दोन ठिकाणी मिळालेल्या आलेखावरून असे म्हणता येते की सोलापूर भूभागाने व्याप्ता असलेला कुंतल प्रदेश हा सम्राट अशोकच्या साम्राज्याचा एक भाग होता. मौऱ्याची सत्ता ही दक्षिणेत मैसूरपर्यंत पसरलेली होती हे श्रवणबेळगोळ येथील शिलालेखावरून सिद्ध झालेले आहे. त्यामुळे आजचे सोलापूर हे मौऱ्याच्या समाजातील एक प्रदेश होता याबद्दल शंका घेण्याचे कारण नाही.
सातवाहन काळ आणि सोलापूर ( इसपु २३५ ते इ. स. पु. २२५ )
मौऱ्यानंतर दक्षिण भागात सातवाहनांचे राज्य उदयास आले सातवाहनांची सत्ता दीर्घकाळ टिकून राहिली होती. सातवाहनांचा कालखंड वैभवशाली कालखंड म्हणून ओळखला जात होता. एकंदर तीस सातवाहन राजे होऊन गेले व त्यांनी ४६० वर्ष राज्य केले होते या साम्राज्यात सोलापूरचा समावेश होता. सातवाहनांची राजधानी प्रतिष्ठान ही होती. तेर सातवाहनांचे प्रमुख व्यापारी केंद्र होते. तेर हे सोलापूर पासून जवळच आहे. सातवाहनांच्या काळात दक्षिणेत मध्यवर्ती असलेल्या औरंगाबाद,अहमदनगर, बीड व सोलापूर जिल्ह्याची मोठ्या प्रमाणात भरभराट झाली. दक्षिणेत तेर पासून उत्तरेत उज्जैनपर्यंत पश्चिमेस असलेल्या कल्याण व शुर्पारक म्हणजे ठाणे जिल्ह्यातील सोपरापर्यंत व्यापारी मार्ग असल्याचा उल्लेख पेरीप्लस ऑफ दि एरिथ्रियन सी या ग्रंथात सापडतो. सातवाहनांच्या काळातील महाराष्ट्रातील सामाजिक व आर्थिक स्थितीवर नेवासा व तेर येथील उत्खननाच्या आधारे प्रकाश टाकता येतो.
सातवाहनांच्या ऱ्हासानंतर महाराष्ट्राच्या पश्चिमेला अभिरांचे राज्य उदयास आले. या राजघराण्याचा संस्थापक ईश्वरसेन होता महाराष्ट्रात अभिरांचे अनेक मांडलिक राजे होते. अजिंठा लेणी गुफा क्रमांक १७ मधील शिलालेखात अभिरांच्या एका मांडलिक राज्याचे राज्य अश्मक (अहमदनगर, बीड) या प्रदेशावर होते असा निर्देश त्यात केला आहे. त्यामुळे कुंतल व सोलापूर प्रदेशावर ही अभीरांचे राज्य होते असे दिसते
वाकाटक आणि सोलापूर ( इ स २५० ते इस ५०० )
सातवाहननंतर पश्चिमेस अभीराबरोबरच विदर्भात वाकाटकांचे घराणे उदयास आले. या घराण्याचा संस्थापक विंध्यशक्ती होता. त्याचा मुलगा पहिला प्रवरसेन याचे महाराष्ट्राच्या दक्षिण प्रदेशावर राज्य होते याच्या एका मुलाचे राज्य दक्षिणेकडील प्रदेशावर म्हणजेच कुंतल प्रदेशावर होते .सोलापूर हा भाग कुंतल प्रदेशात समाविष्ट होता.
वाकाटकानंतर त्यांच्या मांडलिक असलेल्या अश्मक राजाने स्वतंत्र राज्याची स्थापना केली. याकाळात कुंतल प्रदेशाचा समावेश अश्मक राज्यात होत होता. अश्मक राजांना विदर्भात फार काळ राज्य करता आले नाही. कारण विष्णू कुंदन घराण्यातील माधवबर्मन पहिला याने विदर्भावर आक्रमण करून तो भाग आपल्या नियंत्रणाखाली आणला त्याने आपल्या काळात महाराष्ट्राच्या पश्चिमेकडील प्रदेशापर्यंत साम्राज्य विस्तार केला होता यावरून कुंतल प्रदेश माधवबर्मन दुसरा याच्या अधिपत्याखाली असावा असे दिसते.
मान्यखेटचे राष्ट्रकूट आणि सोलापूर
इस ३५० च्या सुमारास दक्षिण महाराष्ट्रात माणपुरच्या राष्ट्रकूट घराण्याचा संस्थापक मानांक हा राजा होता. सातारा जिल्ह्यातील माणपुरा येथे राष्ट्रकूटांची राजधानी असावी, तसेच या काळात सोलापूर जिल्ह्याचा प्रदेश राष्ट्रकूटांच्या ताब्यात असावा असे दिसते. अजिंठा लेणी गुंफा क्रमांक १६ मधील शिलालेखात वाकाटक राजा विंध्येसेन दुसरा याने कुंतल प्रदेशातील राजाचा पराभव केल्याचा उल्लेख आहे. हा पराभूत राजा राष्ट्रकूट घराण्यातील असावा.
गुप्त काळ आणि सोलापूर (इ.स. २४० ते इ.स. ५५०)
गुप्तकालीन संस्कृत साहित्यात कुंतल प्रदेशाबद्दल उल्लेखनीय माहिती मिळते. 'कुंतलेश्वरदौत्य' या संस्कृत ग्रंथात महाकवी कालिदास महाराष्ट्राच्या दक्षिणेकडील कुंतल देशात येऊन गेल्याचे वर्णन आलेले आहे. कुंतलेश्वरदौत्य या मूळ संस्कृत ग्रंथातून घेतलेली काही उदाहरणे राजशेखर लिखित 'काव्यमीमांसा', भोज लिखित 'सरस्वतीकांता भरण' आणि क्षेमेंद्रलिखित 'औचित्यविचारचर्चा' या ग्रंथामध्ये मूळ ग्रंथातील काही उदाहरणे दिलेली आहेत. गुप्त सम्राट दुसरा चंद्रगुप्त किंवा विक्रमादित्य याने महाकवी कालिदासाला आपला राजदूत म्हणून कुंतल प्रदेशात पाठवले होते अशी माहिती मिळते. काही दिवसाच्या वास्तव्यानंतर महाकवी कालिदास सम्राट चंद्रगुप्त दुसरा याच्या दरबारात निघून गेला त्यावेळी कालिदासाने चंद्रगुप्त दुसरा याच्या दरबारात कुंतलेश राजा बद्दल गौरवाचे उद्गार काढले. हा कुंतलेश राजा मानांक याचा पुत्र देवराज असावा.

बदामीचे चालुक्य आणि सोलापूर ( इस ५३५ ते इस ७४७ )
जयसिंह राजाने चालुक्य घराण्याची स्थापना केली. या घराण्यातील सत्तेवर आलेल्या मंगलेश राजाने कुंतल प्रदेशावर स्वारी करून तो प्रदेश जिंकून घेतला होता. त्याने गोदावरी नदी ओलांडून महाराष्ट्रातील कलचुरी प्रदेशावर आक्रमण केले. बदामीच्या चालुक्य घराण्यातील दुसरा पुलकेशी याच्याबरोबर झालेल्या युद्धात मंगलेश मारला गेला. पुलकेशी दुसरा ( इ.स. ६१० ते इ.स. ६४२) चालुक्यांचा सर्वश्रेष्ठ राजा मानला जातो. त्याने महाराष्ट्रात कुंतल प्रदेशावर राज्य करणाऱ्या गोविंद राजाचा पराभव केला होता.पुलकेशी दुसरा हा महाराष्ट्रावर राज्य करीत होता. व नाशिक हि त्याची उपराजधानी होती. याच काळात त्याचा उल्लेख तीन महाराष्ट्राचा अधिकारी असा केला होता. आजच्या सोलापूर प्रांतावर बदामीच्या चालुक्याचे राज्य होते .
मालखेडचे राष्ट्रकूट आणि सोलापूर ( इस ७५३ ते इस ९७३ )
बदामीच्या चालुक्यानंतर महाराष्ट्रावर राष्ट्रकूटांची सत्ता स्थापन झाली दंतिदुर्ग हा या घराण्याचा संस्थापक होता. आजच्या कर्नाटक, आंध्र , तेलंगणा, महाराष्ट्र, मध्य प्रदेश इत्यादी भागावर राष्ट्रकूटांची सत्ता होती. ध्रुव, गोविंद तिसरा इत्यादी राष्ट्रकूट सम्राटांनी गंगा, यमुना नद्यांचा प्रांत जिंकलेला होता. अमोघवर्ष हा या घराण्यातील सर्वात श्रेष्ठ व ज्ञानी राजा म्हणून ओळखला जातो. आपल्या प्रजेवरील संकट दूर व्हावे म्हणून त्याने आपली करंगळी कापून कोल्हापूरच्या महालक्ष्मीला अभिषेक केला होता असा उल्लेख शिलालेखात मिळतो. त्याची राजधानी गुलबर्गाजवळ असणारे मालखेड येथे होती आणि मालखेड हे आजच्या सोलापूर प्रांतापासून फार दूर नाही. यावरून सोलापूर भागावर राष्ट्रकूटांची सत्ता होती हे सिद्ध होते.
कल्याणीचे चालुक्य आणि सोलापूर ( इस १० शतक ते इस १२ शतक )
कल्याणीच्या चालुक्यांची राजधानी कर्नाटकातील बसवकल्याण ही होती. ते ठिकाण सोलापूर पासून फार जवळ असून सोलापुरात जो लिंगायत लोकांचा आजही प्रभाव दिसतो. याच बसवकल्याण जवळ बसवेश्वर आणि वीरशैव धर्माची स्थापना केली. विक्रमादित्य सहावा हा या घराण्याचा कर्तबगार व दानशूर राजा होऊन गेला त्याने दिलेल्या दानपत्राचे उल्लेख सोलापूर जिल्ह्यातील दक्षिण सोलापूर, उत्तर सोलापूर ,मंगळवेढा इत्यादी तालुक्यातील शिलालेखातून आले आहेत. त्यानंतर कल्याणीच्या चालुक्यांचे घराणे प्रभावहीन झाले. कलचुरी घराण्यातील बिज्जलदेव दुसरा ( इस ११३० ते इस ११५६ ) हा चालुक्य राजा तिसरा तैल याचा मांडलिक राजा म्हणून सोलापूर जिल्ह्यातील मंगळवेढा येथे राज्य करीत होता. सोलापूरचे ग्रामदैवत सिद्धेश्वर हा बसवेश्वराच्या अनुभवमंडपमधील एक महापुरुष होता. त्याची समाधी सोलापुरात आहे.काही शिलालेखातून त्याचे उल्लेख महामंडलेश्वर बिज्जलदेव असा आला आहे. या राजाने कल्याणीच्या चालुक्य राजाची सत्ता नष्ट केली. त्याच्या कारकीर्दच कर्नाटकात लिंगायत सांप्रदायाची स्थापना झाली. वीरबिज्जलच्या पदरी बसवेश्वर हा मंत्री व खजिनदार होता. त्यासंबंधी काही शिलालेख मंगळवेढा या ठिकाणी मिळतात. तसेच महाराष्ट्रातील सोलापूर सहित इतर सीमावर्ती जिल्ह्यात लिंगायत संप्रदायाचा मोठ्या प्रमाणात प्रसार झाला. लिंगायत सांप्रदायाच्या दृष्टीने सोलापूर सिद्धरामेश्वरांच्या पावन स्पर्शामुळे एक धार्मिक तीर्थक्षेत्र बनले.
इसवी सन ११३५ च्या शिलालेखात उल्लेखलेले त्रिकटात्मक मंदिर अस्तित्वात नाही. ते कोठे होते, कसे होते याबद्दल काही माहिती नाही. ते काळाच्या उदरात नामशेष राहिले आहे.
यादव काळ आणि सोलापूर ( इस ११८७ ते इ. स.१३१८ )
इ.स. बाराव्या शतकाच्या उत्तरार्धात महाराष्ट्रातील देवगिरी कल्याणीच्या चालुक्याचे मांडलिक म्हणून खानदेशात राज्य करीत होते. सुबाहू याचा पुत्र दृढप्रहर हा यादव घराण्याचा संस्थापक राजा होय. या घराण्यात अनेक शूर व पराक्रमी राजे होऊन गेले. त्यापैकी भिल्लम पाचवा याने दक्षिणेतील होयसाळ, चालुक्य,परमार इत्यादी घराण्याचा पराभव करून देवगिरी या ठिकाणी यादवांची राजधानी बनवली. त्याने इस ११८४ मध्ये सोलापूरचा प्रदेश कलचुरी राजा संकमदेव यांच्याकडून जिंकून घेतला. सोलापूर जिल्ह्यातील मार्डी ( मरुधी ), पळूज ( पुरंजपूर ) याठिकाणी भिल्लम पाचवा, त्याचा पुत्र जैत्रपाल, जैत्रपालचा पुत्र सिंघन याच्या काळात दिलेल्या दानपत्राचे उल्लेख त्या ठिकाणच्या शिलालेखात मिळतात. यादव घराण्यातील प्रसिद्ध राजा रामचंद्र यादव यांचे सोलापूर जिल्ह्यात काही शिलालेख मिळालेले आहेत. त्यातून त्याने दिलेल्या दानपत्राची माहिती मिळते. उदा वेळापूर कुरवली इत्यादी. यादव राजा सिंधन तिसरा याचा एक शिलालेख कामठी खुर्द येथे मिळाला असून या शिलालेखात प्रथमच यादव राजा सिंधन देव याचा उल्लेख महामंडलेश्वर असा केलेला आहे.
यादवांच्या काळात साम्राज्य विस्ताराबरोबरच राजकीय जीवनात शांतता व सुव्यवस्था असल्याने, कला व साहित्याला चालना मिळाली. या काळातच यादवांच्या दरबारी असलेल्या हेमाद्री याने मंदिर वास्तूकलेची पद्धत शोधून काढली. या पद्धतीला हेमाडपंथी पद्धत म्हणून ओळखले जाते. महाराष्ट्र व सोलापूर परिसरात हेमाडपती मंदिरे वेळापूर, पंढरपूर येथे आढळतात. वेळापूरचे हरनारेश्वर मंदिर रामचंद्र यादव यांच्या काळात उभारले गेले. तसेच याच काळात पंढरपूरच्या विठ्ठल मंदिराचे बांधकाम झाले. इ.स. १३१८ मध्ये यादवांची सत्ता संपुष्टात आली. सोलापूर जिल्ह्यात असणाऱ्या अनेक शिलालेखांमधून सोलापूरचा प्राचीन इतिहास माहिती होण्यास मदत होते.कन्नड लिपीमध्ये देखील काही शिलालेख आढळतात. नागरी लिपीमध्ये विशेषतः संस्कृत आणि मराठी या दोन भाषांत शिलालेख विभागले आहेत अपवादात्मक काही ठिकाणी शिलालेख द्वैभाषिक व द्विलिपीत कोरलेले आहेत. उदा कन्नड- मराठी, फारसी -मराठी इत्यादी ही व्यवस्था प्रजेला सुलभतेने राजाज्ञा कळावी म्हणून केलेली होती असे दिसते. चालुक्य सम्राट विक्रमादित्य सहावा याचा नातु बिज्जलदेव दुसरा सत्तेवर आला. त्याचा उल्लेख दिनांक १५ मे इ.स. ११३६ च्या तंबूर येथे सापडलेल्या शिलालेखात महामंडलेश्वर असा आलेला आहे. औराद येथे सापडलेला चालुक्य राजा सोमेश्वर तिसरा याचा दि २४ फेब्रुवारी ११३५ चा लेख महत्त्वाचा आहे. याच राजाचा सोलापूर येथे सापडलेला दि २० जानेवारी ११३६ चा एक शिलालेख असून तो सुद्धा महत्त्वाचा आहे. बीबीदारफळ तालुका उत्तर सोलापूर येथे उपलब्ध झालेल्या यादव राजा सिंघनच्या शिलालेखात पिरियमा रुढीगे ( मार्डीहून) कारभार करणाऱ्या पैतलदेवी नावाच्या राज स्त्रीचे उल्लेख आढळून येतात. या लेखात ती स्वतःचा उल्लेख "चालूक्य कुल प्रस्तुते' असा करते.
यादवांची सत्ता नष्ट झाल्यावर दक्षिणेत मुसलमानी राजवटीचा उदय झाला बहामनी राज्य ( इस १३४७ ते १५२६ ), आदिलशाही राजवट ( इ.स १४९० ते इ.स. १६८६), निजामशाही (इ.स. १४९० ते १६३६) ,मोगल बादशाही ( इ.स. १६८६ ते इस १७२४ ), हैदराबाद निजामची सत्ता (इ.स.१७२४ ते इस १७५९) इत्यादी सत्ता आणि सोलापूर परगाण्यावर राज्य केले. येथूनच मध्ययुगीन सोलापूर बघण्याच्या इतिहासाला सुरुवात झाली.
साधारणपणे या प्रदेशातील यादवाच्या पराभवानंतर मध्ययुगाचा प्रारंभ होतो. तो मराठा सत्तेच्या अस्तापर्यंत मानला जातो. सोलापुरच्या प्राचीन इतिहासाप्रमाणेच मध्ययुगीन इतिहासावरही येथील भौगोलिक वैशिष्ट्यांचा परिणाम झालेला दिसून येतो. मध्ययुगातही सोलापुर परगण्यात एखाद्या स्वतंत्र सत्तेची स्थापना किंवा शहराला राजधानीचे ठिकाण म्हणून स्थान मिळालेले दिसत नाही.
मध्ययुगात हा प्रदेश प्रामुख्याने खिलजी, तुघलक, बहामनी, आदिलशाही, निजामशाही, हैद्राबादचा निजाम, मोघल आणि शेवटी मराठा इत्यादीच्या राजकिय वर्चस्वाखाली होता. सोलापुरच्या मध्ययुगीन इतिहासावर प्रकाश टाकणारी साधने मोठ्या प्रमाणात उपलब्ध आहेत. त्यात प्रामुख्याने दरबारी कागदपत्रे, सरदारांचा पत्रव्यवहार, उर्दु व फारसी भाषेतील अखबारे, शिवकालीन व पेशवेकालीन विवीध प्रकारची कागदपत्रे तसेच ब्रिटिश फॅक्टरी रेकॉर्ड याचा प्रामुख्याने समावेश होतो.
प्राचीन काळापासून सत्तेसाठी विविध गटात राजवटीत संघर्ष चालत आलेला आहे.सहाजिकच सोलापूर परगणा आणि सोलापुरातील भुईकोट किल्ला आपल्या ताब्यात ठेवण्यासाठी अनेक सत्ताधीधांनी प्रयत्न केलेले होते. विजापूरची आदिलशाही आणि अहमदनगरची निजामशाही यांच्यात अनेक वेळा सोलापूर प्रांतावर कोणाची सत्ता असावी, यासंबंधी संघर्ष युद्धे झालेली आहेत.म्हणूनच इतिहासकाराने सोलापूरला युद्धभूमी (Bone of Contention ) असे संबोधले आहे.सोलापूर जिल्ह्यात मुस्लिम राजवटीचे जास्त प्रमाणात अवशेष दिसतात. मध्ययुगीन काळात सोलापूर, नळदुर्ग, औसा व परांडा हे किल्ले आपल्या ताब्यात ठेवण्यासाठी मुस्लिम राजवटीने भरीव स्वरूपाचे प्रयत्न केले होते. यातूनच अनेक सत्ताधीशात संघर्ष सुरू झाला.
इस्लाम धर्म व सत्तेचा प्रसार
महंमद पैगंबर आणि स्थापन केलेला इस्लाम धर्म हा पुढील काळात टप्प्याटप्प्याने जागतिक धर्म बनत गेला इस्लाम केवळ धर्मसत्ता न राहता जागतिक जागतिक राजकीय सत्ता बनली:
उत्तर भारतात वर्चस्व स्थापन करण्यासाठी उत्तरेकडील वायव्य सरहद्दीच्या बाजूने मुस्लिमांनी आठव्या व नवव्या शतकापासून आक्रमणे करण्यास सुरुवात केली त्यांनी भारतात टोळ्याटोळ्याने प्रवेश करून धार्मिक व राजकीय सत्ता प्रस्थापित करण्याचा प्रयत्न केला त्यात विशेषतः गजनी, घोरी, गुलाम, तुघलक, लोधी इत्यादी सत्ताधीशांचा समावेश होतो. सोळाव्या शतकात याच मार्गाने मोगल भारतात आले आणि त्यांनी भारतात आपले राज्य स्थापन केले. त्यांनी आपली सत्ता टिकवण्यासाठी आटोकाट प्रयत्न केले होते. त्यांना बऱ्याच प्रमाणात सत्ता संघर्ष करावा लागला.
महाराष्ट्रावर मुस्लिमांचे पहिले आक्रमण इ.स. १२९४ ला झाले. अल्लाउद्दीन खिलजी महाराष्ट्रावर चाल करून येणारा पहिला मुस्लिम सत्ताधीश ठरला. त्यानंतर दक्षिण भारतावर मुस्लिमांची सातत्याने आक्रमणे होऊ लागली. इ.स. १३२१ मध्ये दिल्लीची सत्ता तुघलकांच्या हाती गेली. त्यांच्याच काळात दक्षिणेत सातत्याने बंडाळे होऊ लागली. स्थानिक सत्ताधीश किंवा मुस्लिम सरदार बंड करीत असत. इ.स. १३४७ मध्ये दक्षिणेतील बंड मोडून काढण्यासाठी महमद तुलकाने आपला सरदार हसन उर्फ जाफरखान यास पाठवले होते. त्याने बंड मोडून काढले परंतु तो गुलाम असल्याने त्यानेच आपल्या मालकाविरुद्ध उठाव करून दक्षिणेत इस १३४७ ला बहामनी राज्यातील स्थापना केली. बहामनी सत्ता १३४७ ते इस १५२७ पर्यंत अस्तित्वात होती. आजच्या महाराष्ट्र व कर्नाटक तेलंगणा या प्रदेशावर त्यांनी राज्य केले. सोलापूर प्रांत हा बहामनी राज्यात समाविष्ट होता. तेव्हापासून सोलापूरचा अंतर्भाव बहामनी राज्यात होऊ लागला. बहामनी राज्याचे प्रशासनाच्या सोयीसाठी चार विभाग पडले होते. पैकी गुलबर्गा प्रशासन विभागात सोलापूर प्रांताचा समावेश होता.
बहामनी सुलतान महम्मद शहा याची कारकीर्द इस १३५८ ते इस १३७५ मानली जाते. हा कालखंड अत्यंत भरभराटीचा मानला जातो. चोर, ठगांचा कायमचा बंदोबस्त होऊन व्यापार उदीम वाढीस लागला होता. याच प्रगतीच्या काळात सोलापूरचा किल्ला बांधला गेला असावा असे मत मानले जाते राज्याचा कर्तबगार दिवाण महंमद गावान याने बहामनी राज्याचे चार ऐवजी आठ वेळा केले. त्यावेळी सोलापूर हे अहसनाबाद विभागात सामील करण्यात आले होते. हा भाग दस्तूर दिनार गावाच्या सिद्धी खोजाकडे होता. त्याच्या ताब्यातील सोलापूर परांडा व इतर शेजारचे किल्ले व मुलुख जैनार खान व खाजा जहान या दोन बंधूंकडे होता. पुढील काळात महंमद गवान विरुद्ध काही सरदारांनी कारस्थान करून त्याला फासावर चढले होते. महंमद गवान मृत्यू पावल्यानंतर बहामनी साम्राज्याची अधोगती सुरू झाली. यातूनच इस १५२६ ला बहामनी साम्राज्याचे विघटन होऊन दक्षिणेत पाच शाह्यांचा उदय झाला. सत्तेसाठी संघर्ष सुरू झाला. दक्षिणेतील मुस्लिमांच्या दरबारी खुद्द मुस्लिमांमध्ये ही सत्ता संघर्ष चालू होता. हा संघर्ष सुन्नी व शिया पंथीय मुस्लिमात होत होता.
आदिलशाही निजामशाही आणि सोलापूर
१४ व्या शतकात सोलापूर येथे बांधलेला भुईकोट किल्ला हा दक्षिण भारतातील विविध कालखंडातील अनेक राजवटीच्या राजकारणाचे महत्त्वाचे केंद्र ठरले होते. इस १४३५ ते इ.स. १४५६ पर्यंत सोलापूर प्रांतात खिलजी, बहामनी इत्यादी सत्ताचा अंमल होता. आदिलशाही, निजामशाही यांच्यात या किल्ल्यावरून बऱ्याच लढाया झाल्या होत्या. किल्ल्यावर ताबा मिळवण्यासाठी निजामशाही आणि आदिलशाही यांच्यात सुमारे ६० वर्ष सतत चुरशीच्या लढाया सुरू झाल्या होत्या. या काळात सोलापूर परगणा कधी विजापूर राज्यात तर कधी अहमदनगरच्या राज्यात गेला होता.
अहमदनगरचा निजामशाही सत्ताधीश मलिक अहमद, विजापूरचा युसूफ अली आदिलशहा आणि बिदरचा इमाद उल मुल्क यांच्यात इ.स. १४९७ मध्ये राज्य विभागणीसाठी तह झाला. यानुसार दौलताबादचा प्रदेश, परांडा किल्ला आणि अकरा किल्ले मलिक अहमदच्या साम्राज्यात समाविष्ट करण्यात आले. झैन खान निजामशाही अधिकारी म्हणून सोलापूरचा सुभेदार बनला. त्याने बिदरच्या इमाद उल मुल्कच्या मदतीने अकरा जिल्ह्यांपैकी निम्म्या प्रदेशावर आपली मालकी प्रस्थापित करण्याचा प्रयत्न केला. तथापि जैनखानचा बंधू ख्वाजा जहाँ याने मलिक अहमदला मदत केल्यामुळे झैनखानला अपयश आले. सोलापूर आणि शेजारच्या अकरा जिल्हे यावर कोणाचा ताबा असावा याबद्दल जैन खान व ख्वाजा जहाँ या बंधू तंटे सुरू झाले. शेवटी सोलापूर जिल्ह्याची वाटणी होऊन सोलापूरच्या एका भागावर अहमदनगर आणि दुसऱ्या भागावर विजापूरची सत्ता प्रस्थापित झाली. तरीदेखील निजामशाही आणि आदिलशाही यांच्या सोलापूरच्या वर्चस्वाबाबत संघर्ष थांबलेला नव्हता. शेवटी इस १५२३ ला इस्माईल अदिलशहा आणि अहमदनगरचा बुर्हाण निजामशाह यांची सोलापूर किल्ल्यात भेट होऊन दोघात मैत्रीचा तह झाला. त्यातूनच उभय राजप्रमुखात नात्याचे संबंध प्रस्थापित झाले. आदिलशहाने निजामशाला सोलापूर जिल्हा व शेजारचा काही प्रदेश हुंडा म्हणून देण्याचे ठरले होते. तथापि पुढील काळात आदिलशहाने सोलापूरचा किल्ला निजाम शहाला देण्यास नकार दिल्यामुळे त्यांच्यात युद्ध चालूच राहिले होते.
इस १५६२ मध्ये पुन्हा एक वेळ उभयतात तडजोड होऊन नगरच्या राजकन्येचा विवाह विजापूरच्या अली आदिलशाह बरोबर झाला. अली आदिलशाची बहीण हदीया सुलताना हिचा नगरचा मुहूर्तजा बादशहा बरोबर विवाह घडून आला. सोलापूरचा किल्ला चांदबिबीच्या लग्नाचा हुंडा म्हणून विजापूरकरांना देण्यात आला. त्यामुळे काही काळ विजापूर आणि अहमदनगर यांच्यात मैत्रीचे संबंध निर्माण झाले होते. इस १६२३ मध्ये निजामशाहीच्या मलिक अंबरने सोलापूर परगणा जिंकला. मोगलांच्या दक्षिणेवरील स्वारीच्या काळात इस. १६३६ ला मोगल आणि विजापूरचा आदिलशहा यांच्यात तह होऊन निजामशाहीचा शेवट झाला. या तहानुसार परंडा सोलापूर आणि आसपासचे किल्ले महंमद आदिलशहाच्या ताब्यात देण्याचे ठरले. इस १६८६ मध्ये औरंगजेबाने विजापूरच्या शेवटच्या स्वारीच्या वेळी सोलापूरच्या किल्ल्यात तळ दिला होता

शिवछ्त्रपती आणि सोलापुरचा इतिहास :-
पुरंदरच्या तहात गेलेली संपत्ती व किल्ले परत मिळवण्यासाठी आखलेल्या दुसऱ्या सुरत मोहिमेवर जाण्याअगोदर छत्रपती शिवाजी महाराजांनी मुगलांना नियंत्रणात आणण्यासाठी जी योजना आखली त्यात माढा, बार्शी, परांडा हा नगर निजामशाहीत व मुघलशाहीत मोडणारा सीना व भीमाकाठचा सधन बागायत भागही समाविष्ट होता. हा भाग परांडा किल्ल्याच्या नियंत्रणात होता. माढा तालुक्याचे शिवकालीन नाव "माढे, माढं' असून या तालुक्यांवर शिवपूर्व बहामनी काळापासून कायमच सुलतानी सत्तेचे राज्य होते. सीना व भीमा नदीकाठ हा मुख्य खंडणीमुलूख होता. औरंगजेबाने या भागावर इ. स. १६५७ मध्ये नासीरखान, इ. स. १६६२ मधे सय्यद महमद खान यांना नेमून "जुन्नर, पांडे, श्रीगोंदा, अष्टी, कडा व परिंडा खालील मुलूख सांभाळून संधी मिळताच सीमा ओलांडून मराठ्यांचा मुलूख बेचीराख करून खेडी ओस करावी असा उल्लेख असलेले औरंगजेबाची हुकूमपत्रे उपलब्ध आहेत. यासाठी औरंगजेबाने दीड हजार जाठ, दीड हजार पायदळ, २० तोफा,५०० बंदूकधारी सैन्य व अन्य सरदार, शिपाई परांडा किल्ल्यावर तैनात केले होते. हेच सैन्य परांडा, माढा आदी भागातून सीमा ओलांडून स्वराज्याच्या सीमेवरील नागरिकांना व गावांना त्रास देत असल्याच्या वार्ता छत्रपती शिवाजी महाराजांच्या कानी गेल्यानंतर मुघलांचा बंदोबस्त करण्यासाठीच महाराजांनी दुसरऱ्यांदा सुरत मोहिमेवर जाण्यापूर्वी मुगलांना सीमेबाहेर काढण्यासाठी अगोदर जुन्नर येथील कारतलब खानाला झोडपले व नगर येथील परांडा परगण्यातून, माढ्यातून व आसपासच्या क्षेत्रातून स्वराज्याच्या सरहद्दीत घुसखोरी करणारे अब्दुल मुनीम, नासीर खान, राव करणसिंह, सर्जाखान या मुगल अधिकाऱ्यांना महाराजांनी चांगलेच झोडपून काढल्याचा उल्लेख मुगल दरबारच्या एका फारसीतील तवारीखेच्या नोंदवहीत आहे. शके १५९२ वैशाख वद्य चतुर्दशी (इ. स. ८ मे १६७०) जुन्नर, नगर, परिंडा महालातील ५१ गावांत छत्रपती शिवाजी महाराजांनी मुघलांना शिकस्त दिल्याचा उल्लेख आहे. या नामावलीत "परांडे' महालातील मौजे "बार्सी' व मौजे "माढे' असा उल्लेख असून हा मूळ मजकूर औरंगजेबाच्या दरबारी कारकुनाच्या नोंदवहीत आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी या हल्ल्यातून मुगल सैन्याला शिकस्त दिली व माढा, बार्शीसह आसपासच्या ५०-५२ गावांतील रयतेचेही रक्षण केले. माढा तालुक्यात घडलेल्या या ऐतिहासिक घटनेला ८ मे २०२० रोजी ठीक ३५० वर्षे पूर्ण झाली आहेत.मोहिमेत महाराजांसह स्वराज्याचे महापराक्रमी सेनानी व शिवरायांचे व्याही सेनापती कुडतोजी ऊर्फ प्रतापरावजी गुजर व अन्य मुत्सद्दी आनंदरावजी, निळोपंत आदी मराठेशाहीतील मातब्बर मंडळी उपस्थित होती. जून १६७० मधील एका कतब्यानुसार महाराजांनी मंगळवेढा, पंढरपूर, तुळजापूर आदी भागासह बादशाही व निजामशहीच्या मुख्य इलाख्यात मोहीम केली व पुढे जुलै १६७० ला या भागातून परत जाऊन २ ऑक्टोबर १६७० मधे कल्याण-भिवंडी-नाशिक खानदेश मार्गे सुरतेत गेले व सुरत मोहिमेनंतर आल्यामार्गे किल्ले रायगडावर परतले. या ऐतिहासिक घटनेत शिवछत्रपतींची पाऊले सोलापूर जिल्ह्यात विविध ठिकाणी तथा माढा तालुक्यात उमटलेली आहेत.
औरंगजेब आणि सोलापूर
श्री. ग.ह खरे यांनी भारत इतिहास संशोधक मंडळातर्फे प्रकाशित केलेला ऐतिहासिक फारसी साहित्य खंड सहावा हा ग्रंथ औरंगजेबाच्या दरबाराच्या बातम्यावर प्रकाश टाकणारा आहे. हा ग्रंथ मूळ फारसी भाषेत आहे. त्याचे मराठी भाषांतर या ग्रंथात दिलेले आहे. त्यामुळे औरंगजेब आणि सोलापूर संबंधात बरीच माहिती मिळवणे शक्य झाले आहे. दक्षिणेतील मराठा राज्य आदिलशाही कुतुबशाही या राजवटी बुडवण्यासाठी बादशहा १६८१ ला दक्षिणेत आला होता. इस १६८१ ते इस १७०७ या काळात औरंगजेबाच्या राजकीय हालचाली दक्षिणेत चालू होत्या. त्याने सोलापूरच्या किल्ल्याचा नकाशा काढून आणण्याची आज्ञा यापूर्वीच आपल्या अधिकाऱ्यांना दिलेली होती. विजापूर जिंकण्यासाठी औरंगजेब सोलापुरात राहून सुत्रे हलवीत होता. त्याचा एक वर्षभर मुक्काम सोलापुरातच होता. शेवटी १६८६ ला औरंगजेबाने सोलापूर सोडले आणि विजापूर जिंकले. विजापूर जिंकल्यावर औरंगजेब सोलापुरात आला. इस १६८७ मध्ये औरंगजेबाचा नातू (आझमचा मुलगा ) बेदारबख्त याचा सोलापूरच्या जुम्मा मशिदीत विवाह झाला. इस १६८८ ला औरंगजेब विजापूरास गेला.तथापि त्या ठिकाणी प्लेगची साथ सुरू झाल्यामुळे औरंगजेब तेथून पेडगावकडे निघाला असता वाटेत अकलूज येथे त्याला छत्रपती संभाजी राजे मुघलांच्या हाती लागल्याचे वर्तमान मिळाले. ह्या आनंदाप्रीत्यर्थ त्याने अकलूजचे नाव बदलून असदनगर ( शुभ नगर ) असे ठेवले. छत्रपती संभाजींचा औरंगजेबाने छळ करून हत्या केल्यामुळे मराठे सुडाने पेटून उठले. त्यांनी मुलांना सळो की पळो करून सोडले होते. त्यामुळे औरंगजेबाने गलगली येथे आपली छावणी हलवली आणि तो भीमा नदीच्या काठावर असणाऱ्या ब्रह्मपुरी येथे मे १६९५ ला आला. औरंगजेबाच्या वास्तव्यामुळे ब्रह्मपुरीचे बेगमपुरात रूपांतर झाले. येथे असताना औरंगजेब दरवर्षी बकरी आणि रमजान ईद या सणावाराच्या दिवशी तो ब्रह्मपुरी होऊन सोलापूरला येत असे. बऱ्याच वेळा तो रमजानचा एक महिना सोलापुरात मुक्काम करीत असे अशा प्रकारच्या नोंदी मोगल दरबाराच्या बातमीपत्रात आढळतात. ब्रह्मपुरी येथून औरंगजेब दर शुक्रवारी सोलापूरच्या जुम्मा मशिदीत नमाज पडण्यासाठी येत असे. बादशहाची सोलापूरला ये-जा, त्याच्या वाटेवरील ठाणे बंदोबस्त, चौकी पहारे सोलापूर किल्ल्यातील किल्लेदार, किल्ल्याची स्थिती, दारूगोळा, किल्ल्याचा नकाशा इत्यादी विषयी माहिती अखबारात मिळते. सोलापूर जिल्ह्यातील २५ तोफा मराठ्यांनी १६८० च्या दरम्यान पळवून नेल्या होत्या.छत्रपती संभाजीराजांनी सोलापूर ठाण्यावर वारंवार हल्ले केल्याचे सोलापूर किल्ल्यात नुस्तृतबक्ष तोफ असल्याचे ८ एप्रिल १६८३ च्या अखबारावरून समजते. औरंगजेबाने १६९५ ला सोलापूरच्या बागा पाहण्यासाठी ख्वाजा याकुत याला सोलापूरला पाठवले होते. सोलापूरच्या किल्ल्यात असणार्या कैद्याची चौकशी करण्यासाठी औरंगजेबाने मेहदी खानला आज्ञा दिली होती. तसेच बादशहाने सोलापूरच्या विहिरीची दुरुस्ती करण्यासाठी ख्वाजा याकूतला सांगितले होते. सोलापूरच्या किल्लेदाराने बादशहाला विनंती केली होती की सोलापुरातील आपल्या निवासस्थानातून पाण्याचा पाट तयार करण्यात आला आहे. त्याला एकूण पाच हजार रुपये खर्च आला असून त्यापैकी सरकारी रक्कम ४००० रुपये झाली. मी माझे स्वतःचे तीनशे रुपये खर्च केले ते तीनशे रुपये माझ्याकडून खंडणी म्हणून समजावे. पाटाचे पाणी बागेत आणण्यात आले आहे. बादशहाने आज्ञा केली की एक माणूस सोलापूरला पाठवण्यात यावा. त्याने जाऊन प्रत्यक्षात किती खर्च झाला याची चौकशी करावी अशी माहिती अखबारात माहिती मिळते.
दि ३१ मार्च १६९६ ला औरंगजेबाच्या आज्ञेवरून सोलापूरचा किल्लेदार मेहंदी खान बादशहाचा उंटरखाना औरंगाबादला पोहोचण्यासाठी गेला असता मराठ्यांनी मेहंदी खान व त्याच्या सैन्यावर हल्ले केले. त्यांच्यात झालेल्या लढाईत बादशहाच्या सैन्याने मराठ्यांचा पराभव करून त्यांच्या ताब्यातून बादशाचे बैल व उंट सोडवले होते अशी माहिती मिळते. औरंगजेबाने सोलापुरातील खंदकाची दुरुस्ती केली. सोलापूरच्या इदग्याची दुरुस्ती केली. किल्ल्यात बंगल्याची पक्की इमारत बांधली. बागाकडे विशेष लक्ष दिले. सोलापूरच्या किल्लेदाराला बढती दिली सोलापुरात कालवा तयार करण्याची आज्ञा दिली इत्यादी बातम्या अखबारातून मिळतात. या नोंदीवरून सोलापूर किल्ल्याचे महत्व औरंगजेबाने ओळखले होते. तसेच या भागात पाण्याचा प्रश्न मिटवण्यासाठी त्याने आपल्या अधिकाऱ्यांना कालवा काढावा अशा सूचना दिलेल्या होत्या. विजापूरचे राज्य अस्तित्वात होते तोपर्यंत मोगलांच्या राजकारणात सोलापूर हे औरंगाबाद विजापूर मार्गावरील महत्त्वाचे ठिकाण होते. विजापूर विरुद्ध दारूगोळा व शस्त्रास्त्रे यांचा साठा करण्याचे योग्य स्थळ म्हणून मोगल नेहमी सोलापूरचा उपयोग करीत.
यावरून औरंगाबादच्या दक्षिणेतील स्वारीच्या वेळी सोलापूर व आसपासच्या प्रदेशाला राजकीय दृष्ट्या अनन्य साधारण महत्व आलेले दिसते.
सोलापुरचा आधुनिक इतिहास :-
भारतीय स्वातंत्र्यलढ्याच्या इतिहासात कित्येक संघर्षपूर्ण आणि तितक्याच प्रेरणादायी घटनांचा समावेश आहे. ब्रिटिश सरकारकडून स्वातंत्र्य मिळवण्यासाठी कित्येक ज्ञात-अज्ञात स्वातंत्र्यसैनिकांनी आपल्या जीवाची बाजी लावली. त्यांनी दिलेल्या बलिदानामुळेच आज भारताला स्वातंत्र्याची चव चाखता येत आहे, असं म्हटलं जातं. भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील काही घटना ठळकपणे सर्वांना ज्ञात आहेत, तर काही घटनांविषयी फारशी माहिती उपलब्ध नाही. भारताच्या इतिहासातील अशीच एक महत्त्वपूर्ण घटना म्हणजे सोलापूरचा स्वातंत्र्यलढा. या लढ्याच्या माध्यमातून सोलापूरने देशाला स्वातंत्र्य मिळण्याच्या १७ वर्षांपूर्वीच चार दिवसांचं स्वातंत्र्य उपभोगलं होतं. ९ ,१०, ११, १२ मे १९३० असे एकूण चार दिवस सोलापूर स्वतंत्र होतं. त्या कालावधीत देशात इतर अनेक शहरांमध्येही आंदोलने झाली, पण केवळ सोलापूर शहरात 'मार्शल लॉ' लावून ब्रिटिश सरकारने ते लष्कराच्या ताब्यात दिलं होतं. ब्रिटिश सरकारच्या १५० वर्षांच्या राजवटीत 'मार्शल लॉ'ची अंमलबजावणी करण्यात आलेलं एकमेव शहर म्हणजेच सोलापूर अशीही इतिहासात नोंद आहे. अखेर, या संपूर्ण घटनाक्रमादरम्यान १२ जानेवारी १९३१ रोजी सोलापुरातील चार हुतात्म्यांना फाशीही शिक्षा ठोठावण्यात आली होती.
सविनय कायदेभंग आणि सोलापूर
या संपूर्ण प्रकरणाची नाळ महात्मा गांधी यांच्या सविनय कायदेभंग चळवळीशी जोडलेली होती. महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली देशातला स्वातंत्र्यलढा जोर पकडू लागला होता. १९३० मध्ये गुजरातमध्ये साबरमती आश्रमात काँग्रेसच्या कार्यकारी बैठकीत महात्मा गांधीजींनी सविनय कायदेभंग चळवळीची घोषणा केली. त्याचाच एक भाग म्हणून मीठाच्या कराविरुद्ध महात्मा गांधी यांनी १२ मार्च १९३० रोजी दांडी यात्रेस सुरुवात केली. त्यावेळी सोलापुरात सार्वजनिक सभा, लोकसभा, जिल्हा सभा, मुंबई इलाखा प्रांतिक सभा यांची अधिवेशने आयोजित केली जात असत. दुसरीकडे वृत्तपत्रांचाही जनमानसावरील प्रभाव वाढत होता. ५ एप्रिल १९३० रोजी दांडी यात्रा संपन्न झाली. सविनय कायदेभंग आणि दांडी यात्रा यांना देशभरात प्रचंड प्रतिसाद मिळाला.
या आंदोलनात सोलापूरनेही भरभरून सहभाग नोंदवला. काँग्रेस कमिटीने मीठाच्या सत्याग्रहादरम्यान शहराच्या मध्यवर्ती भागात मीठाच्या पुड्या बनवून त्या
जाहीर लिलावाने विकून कायदेभंगास सुरुवात केली. जिथे समुद्र किनारा नाही तेथील लोकांनी दारुबंदीचा प्रचार करावा, ताडीची झाडे काढून टाकावीत, असं आवाहन महात्मा गांधींनी केलं होतं. त्यानुसार, सोलापुरातील रुपाभवानी मंदिर परिसरात असलेल्या शिंदीच्या झाडांनाही सत्याग्रहींनी लक्ष्य केलं. गिरणगाव म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सोलापुरात त्यावेळी पाच कापड गिरण्या होत्या. या कापड गिरण्यांमध्ये १५ ते २० हजार कामगार त्यावेळी काम करत असायचे. शहरात पुकारण्यात येणाऱ्या कोणत्याही आंदोलनांमध्ये या गिरणी कामगारांचा उत्स्फूर्त सहभाग असायचा.
त्या काळात सतत कोणत्या ना कोणत्या प्रभातफेरी, मोर्चे, संप यांचं आयोजन करण्यात येत असे. या सर्व आंदोलनांमुळे शहरातील वातावरण अतिशय स्फूर्तिदायक आणि देशभक्तीमय बनलं होतं.
'पकडे गये गांधीजी, अब तो निंद छोडो'
सविनय कायदेभंग चळवळीवर नियंत्रण मिळवण्यासाठी ब्रिटिश सरकारने महात्मा गांधी यांना अटक करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार, गुजरातच्या कारडी गावात महात्मा गांधींना ४ मे १९३० रोजी अटक करण्यात आली. ही बातमी सोलापुरात ५ मे १९३० रोजी रात्रीच्या सुमारास पोहोचली.गांधीजींच्या अटकेची माहिती मिळताच सोलापुरातील काँग्रेस कमिटीच्या कार्यकर्त्यांमध्ये अस्वस्थेतेचं वातावरण निर्माण झालं. त्यावेळी श्रीनिवास काडगावकर नामक एक कार्यकर्ते आपल्या जोरदार आणि पहाडी आवाजासाठी ओळखले जात असत. काडगावकर यांनी लागलीच डोक्यावर 'किटसन' बत्ती घेऊन गांधीजींच्या अटकेची माहिती लोकांना देण्यास सुरुवात केली. 'पकडे गये गांधीजी, अब तो निंद छोडो, नहीं चलेगी, नहीं चलेगी, जुलमी सरकार नहीं चलेगी,' अशा घोषणा देत त्यांनी रात्रभर लोकांना जागवलं आणि वातावरण निर्मिती केली. पुढच्या दिवशी म्हणजेच 6 मे रोजी कडकडीत हरताळ पाळण्याचा संदेश काँग्रेस कमिटीने दिला. त्यानुसार, 6 मे रोजी स्थानिक नेत्यांच्या जाहीर निषेध सभा झाल्या. काँग्रेसच्या वतीने रामकृष्ण जाजू यांनी गांधीजींच्या अटकेची अधिकृत माहिती सर्वांना दिली. शहरात दिवसभर तणाव कायम होता. कापडगिरण्या, बाजारपेठा, व्यापारी व्यवहार वगैरे त्यादिवशी बंद ठेवण्यात आले.
दरम्यान, रस्त्यांवर आलेल्या जमावाचा असंतोष ठिकठिकाणी दिसू लागला. लहान-मोठ्या मिरवणुका, घोषणाबाजी, दारू दुकानांची नासधूस इत्यादी प्रकार सुरू झाले. जमावातील एका गटाने मद्रास मेल अडवून ठेवली. लोकांमधील संतप्त भावना आवरणं आता कठीण झालं होतं. त्यामुळे ज्येष्ठ नेत्यांनी पुढच्या दिवशीचे ( ७ जानेवारी) सर्व कार्यक्रम रद्द केले. पण युवक संघाला ही भूमिका पटली नाही. त्यांनी तिथंच सभा घेऊन कापड गिरण्या बंद करण्याचा आणि ३ दिवस हरताळ पाळण्याचा आदेश दिला. ७ मेच्या दिवशी सकाळपासूनच वातावरणात तणाव होता. शहरात लक्ष्मी-विष्णु मिलजवळ पोलिसांना गोळीबार करावा लागला. दिवसभर मिरवणुका, पोलिसांची हुर्यो उडवणं, त्यांना गांधी टोपी घालायला लावणं, असे प्रकार सुरू होते. नेत्यांनी सर्वांना शांतता राखण्याचं आवाहन केलं. उद्या गिरण्या बंद करू नका, शहरात हुल्लडबाजीला ऊत आला आहे, असं ते म्हणाले. मात्र, गांधीजींच्या अटकेचा निषेध शक्य त्या मार्गाने केला गेला पाहिजे, या भूमिकेवर युवक संघाचे कार्यकर्ते ठाम होते.
पोलिसांविरुद्धचा संघर्ष
८ मे १९३० रोजी वीर नरिमन आणि जमनालाल बजाज यांच्या अटकेची वार्ता सर्वत्र पसरली. वीर नरिमन हे युवक संघाचे प्रमुख होते. त्यांच्या अटकेच्या निषेधार्थ एक मिरवणूक काढण्यात आली. मिरवणूक संपवून नेते मंडळी परतली. दरम्यान, काही तरुण रुपाभवानी मंदिराकडे शिंदीची झाडे तोडण्यासाठी गेले. नियोजित कार्यक्रमानुसार असं काही ठरलेलं नव्हतं. पण तरूण आंदोलकांच्या उत्साहाला उधाण आलं होतं. याची माहिती मिळताच पोलिसांनी कुमक बोलावून परिसरात नाकाबंदी केली. इन्स्पेक्टर नॅपेट हे पोलिसांच्या पथकाचं नेतृत्व करत होते. जमावाने दगडफेक करून पोलिसांना हुसकवण्याचा प्रयत्न केला, पण नॅपेट यांनी गोळीबार केला. शिवाय, ९ जणांना अटकही केली. मात्र, तरीही जमाव मागे सरकला नाही. त्यांनी अटक केलेल्या तरुणांना सोडण्याची मागणी केली.दरम्यान, या घटनेची माहिती सोलापूरचे तत्कालीन कलेक्टर हेनरी नाईट तसंच पोलीस उपअधीक्षक प्लेफेअर यांना देण्यात आली. दोघेही आणखी जास्त कुमक घेऊन रुपाभवानी मंदिर परिसरात दाखल झाले. कलेक्टर हेनरी नाईट हे हातात बंदूक घेऊन आवेशातच गाडीतून खाली उतरले. त्यांची ती भूमिका पाहून जमाव अधिकच संतप्त झाला. पकडलेल्या सर्वांना सोडा, या मागणीवर सर्वजण ठाम होते.
दगडफेकीत DSP फ्लेपेअर आणि 3 पोलीस जखमी झाले. पोलिसांकडील गोळ्या संपत असल्याचं पाहून जमावाने आणखी आक्रमकपणे पोलिसांचा विरोध सुरू केला. या संघर्षाची माहिती मिळताच तरुण कार्यकर्ते मल्लप्पा धनशेट्टी आणि त्यांच्यासोबत जिवराज मुलूकचंद तिथे आले. मल्लप्पा धनशेट्टी यांचा शहरातील तरुणांवर प्रभाव होता. पकडलेल्यांची नावे लिहून घेऊन त्यांना सोडून द्या, अशी विनंती मल्लप्पा धनशेट्टी पोलिसांना करत होते. इतक्यात शंकर शिवदारे नामक तरुण कार्यकर्ता हातात तिरंगा झेंडा घेऊन कलेक्टर नाईट यांच्या दिशेने धावत आला. तेव्हा कलेक्टर नाईट यांच्या जिवीतास धोका असल्याचं वाटून सार्जंट हॉल यांनी शंकर शिवदारे यांच्यावर गोळी झाडली.शिवदारे जागीच कोसळले. या संपूर्ण घटनाक्रमात पहिला हुतात्मा म्हणून शंकर शिवदारे यांचंच नाव घेतलं जातं.
दरम्यान, शिवदारे खाली कोसळल्याचं पाहून संतप्त जमाव कलेक्टर नाईट यांच्या दिशेने चाल करून येऊ लागला. त्यांच्या वाहनाला घेराव घातला. मात्र मल्लप्पा धनशेट्टी यांनी जमावाला रोखलं आणि कलेक्टर नाईट यांच्याशी केलेल्या चर्चेनंतर पोलिसांनी पकडलेल्या लोकांना सोडून दिले. त्यानंतर पोलिसांच्या गाड्यांना रस्ता मोकळा करून देण्यात आला. मात्र, यामुळे मल्लप्पा धनशेट्टी हेच जमावाचं नेतृत्व करतात, अशी कलेक्टर नाईट यांची धारणा बनली. कलेक्टर नाईट यांनी जमावातून बाहेर पडत असताना अचानक पोलिसांना गोळीबार करण्याचा आदेश दिला. त्यामध्ये तीन जण धारातिर्थी पडले. अनेकजण जखमी झाले. पोलिसांच्या अशा अनपेक्षित प्रतिक्रियेमुळे सोलापूरच्या जनतेत प्रचंड असंतोष निर्माण झाला. यानंतर मात्र सोलापुरात पोलीस आणि नागरिक यांच्यातील जोरदार संघर्ष शिगेला पोहोचला.
'४ दिवसांचं स्वातंत्र्य'
संतप्त जमावाने आपला मोर्चा जवळच्याच मंगळवार पेठ पोलीस चौकीकडे वळवला. पोलीस चौकीवर हल्ला करून जमावाने एका पोलीस कर्मचाऱ्याला मारहाण करून पेटवून दिलं. तर दुसऱ्या एका पोलीस कर्मचाऱ्याला पोलीस चौकीला आग लावून आतमध्ये ढकलून दिलं. दोन पोलीस कर्मचारी यात मृत्युमुखी पडले.

सोलापुरातील ऐतिहासिक मंगळवार पेठ पोलीस चौकी
त्यानंतर जमाव गोलचावडी येथील कोर्टाकडे गेला. कोर्टाची कागदपत्रे, इमारत त्यांनी पेटवून दिली. हा संपूर्ण प्रकार तीन ते चार तास सुरू होता. पण सकाळच्या
रुपाभवानी मंदिराकडील अनुभवामुळे कलेक्टर आणि पोलीस उप-अधीक्षक यांनी याबद्दल बघ्याची भूमिका घेतली. दरम्यान, जमावाचा हा प्रक्षोभ पाहून इतर पोलीस चौक्यांमधील इंग्रज अधिकारी व इतर कर्मचारी यांनी शहरातून काढता पाय घेणंच उचित समजलं.
सोलापूर शहर शांत होत नाही, हे पाहून कलेक्टर हेनरी नाईट यांनी यासंदर्भात मुंबईला अहवाल पाठविला व लष्कराची मदत मागविली. मुंबईच्या गृह सचिवांनी केंद्र सरकारला याबाबत कळवलं, "सोलापुरात १८ हजार कामगार मोकाट सुटले आहेत, ब्रिटिश अधिकारी व त्यांच्या कुटुंबीयांना धोका आहे, ते जीव मुठीत धरून जगत आहेत तरी लष्कर ताबडतोब पाठवावे.'
वरीष्ठ इंग्रज अधिकाऱ्यांनी सर्वप्रथम आपल्या कुटुंबीयांना रेल्वेमार्गे मुंबई-पुण्याकडे पाठवून दिलं. अधिकाऱ्यांनी सोलापूर रेल्वे स्थानकात आश्रय घेतला. आपल्या कुटुंबीयांना एकत्रित करण्याच्या कामात व्यत्यय येऊ नये, लोकांचं लक्ष दुसरीकडे वेधलं जावं, यासाठी सशस्त्र पोलिसांकडून दुपारी एक वाजल्यापासून ते सायंकाळी सात वाजेपर्यंत दोन गाड्यांमधून गोळीबार यादरम्यान पोलिसांनी १०३ गोळ्या चालवल्याची नोंद आहे. या गोळीबारात अनेकांचा मृत्यूही झाला. यानंतर कलेक्टर नाईट हे रजेवर गेले. इतर इंग्रज अधिकारी पोलिसांच्या बंदोबस्तात रेल्वे स्टेशनवरच बसून होते.
९,१०,११ व १२ मे १९३० असे पुढचे एकूण चार दिवस सोलापूर शहर एकप्रकारे स्वतंत्रच होतं. यादरम्यान, १० मे रोजी बकरी ईदचा नमाज नेहमीप्रमाणे शांततेत पार पडला. शहरातील विविध कामे युवक संघाच्या तरुण कार्यकर्त्यांना वाटून देण्यात आली होती. गांधी टोपी परिधान केलेले कार्यकर्ते पोलिसांनी पळून जाताना फेकलेल्या रायफली हातात घेऊन ट्रेझरीवर पहारा देत होते.
...आणि तिरंगा फडकला
शहरात कार्यकर्त्यांमार्फत रहदारी नियंत्रण तसंच इतर व्यवहार वगैरे कामे सुरळीत चालू होती. फक्त इंग्रज सरकारमधील अधिकारी किंवा पोलीस प्रशासनाची तिथं उपस्थिती नव्हती. "ओस पडलेल्या पोलीस ठाण्यांमध्ये लोकांनी गाढवं नेऊन बांधली होती," असं इतिहासकार सांगतात. शहरातील संपूर्ण व्यवस्थेचं नियंत्रण त्यावेळी सोलापूर काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष रामकृष्ण जाजू यांनी केलं. यामुळे त्यांना नंतर 'मार्शल जाजू' म्हणून नवी ओळख मिळाली, असं म्हटलं जातं.या कालावधीत कलेक्टर कार्यालय, फौजदार चावडीवर तिरंगा झेंडा फडकविण्यात आला. संपूर्ण भारतात तिरंगा फडकवण्याचा मान मिळवणारी सोलापूर ही पहिलीच नगरपालिका ठरली होती. या चार दिवसांच्या स्वातंत्र्याचा उल्लेख त्यावेळी 'गांधीराज' म्हणून केला जायचा, स्वातंत्र्य मिळाल्यावर भारतीय लोक त्यांचं राज्य कसे चालवतील याचा वस्तुपाठ सोलापूरकरांनी त्या चार दिवसांत घालून दिला, असं अभिमानाने सोलापूरकर सांगतात.
या कालावधीत मुंबई-पुण्याच्या वृत्तपत्रांमध्ये ब्रिटिश प्रोपगंडानुसार सोलापूर शहर गुंडांच्या ताब्यात गेल्याच्या बातम्या प्रसिद्ध होत होत्या. पण सोलापुरात 'कर्मयोगी' आणि 'सोलापूर समाचार' या वृत्तपत्रांनी संपूर्ण हकीकत मांडली. त्यांचे विक्रमी अंक यादरम्यान विकले गेले होते.
'मार्शल लॉ'
शहरातील सर्व व्यवहार आता सुरळीत सुरू असल्याचं काँग्रेस कमिटीने मुंबई सरकारला कळवलं होतं. पण तरीही स्थानिक इंग्रज अधिकाऱ्यांच्या विनंतीनुसार इंग्रज लष्कर १२ मे रोजी रात्री सोलापुरात दाखल झालं. लष्कराने पोहोचता क्षणीच शहरात मार्शल लॉ लागू केला. दिसेल त्याला गोळी घालण्याचे आदेश जारी करण्यात आले होते. यावेळी सोलापूरच्या नगरपालिकेवरील तिरंगा झेंडा काढण्याचा हुकूम लष्कराने दिला. होता. पण नगराध्यक्ष माणिकचंद शहा यांनी त्यास नकार दिला, तेव्हा लष्करी न्यायालयाने त्यांना ७ वर्षे सक्तमजुरी व १ लाख रुपये दंड अशी शिक्षा सुनावली. तर तुळशीदास जाधव यांनी गांधी टोपी परिधान केल्यामुळे त्यांनाही ७ वर्षे सक्तमजुरी आणि १ लाख रुपये दंड अशी शिक्षा देण्यात आली. (पुढे गांधी-आयर्विन करारानुसार यामध्ये सवलत देण्यात आली होती.)
मंगळवार पेठ पोलीस चौकी जळीतप्रकरणात १३ मे रोजी जगन्नाथ शिंदे, श्रीकिसन सारडा यांना तर १४ मे रोजी मल्लप्पा धनशेट्टी आणि कुर्बान हुसेन यांना अटक करण्यात आली. त्यावेळी वरील चौघांसह शहरातील ज्येष्ठ काँग्रेस कमिटी कार्यकर्त्यांवर अतिशय अमानुष अत्याचार इंग्रज अधिकाऱ्यांनी केले. दोरखंड बांधून, सिगारेटचे चटके देऊन त्यांना रात्रभर मारहाण करण्यात आली. दुसऱ्या दिवशी शहरात सर्वांची धिंडही काढण्यात आली. परिणामी शहरात स्मशान शांतता पसरली. पकडलेल्या सर्वांवर खटले भरून त्यापैकी धनशेट्टी, सारडा, शिंदे आणि हुसेन यांना फाशीची शिक्षा सुनावण्यात आली. हायकोर्टानेही ही शिक्षा कायम केली. शहरात मार्शल लॉ लागू असल्यामुळे वरील चौघेही आपलं निर्दोषत्व सिद्ध करण्यासाठी पुरावे आणू शकले नाहीत.
मार्शल लॉ कालावधीत पोलिसांवरील खर्च सोलापूरकरांवर जादा कर बसवून वसूल करण्यात आला. अखेर, ४९ दिवसांनंतर शहरातील मार्शल लॉ ३० जून १९३०0 रोजी मागे घेण्यात आला.
सोलापूर शहरात मार्शल लॉ लागू झाल्यानंतर ब्रिटिश सरकारविरोधात कट रचणे, सरकारविरोधात कट करण्यासाठी जमावास एकत्रित करणे, ब्रिटिश सरकारच्या सेवेतील दोन पोलीस कर्मचाऱ्यांना जाळून मारणे, या आरोपांखाली जगन्नाथ रेवणसिद्धप्पा धनशेट्टी (वय ३२), श्रीकिसन लक्ष्मीनारायण सारडा (वय ३६), जगन्नाथ भगवान शिंदे (वय २४) आणि अब्दुल रसूल कुर्बान हुसेन (वय २०) या चार तरूणांना अटक करण्यात आली.
1. मल्लप्पा धनशेट्टी -
मल्लप्पा धनशेट्टी हे पंढारकर पेढीत मुख्य मुनीम म्हणून काम करत. लोकांमध्ये ते विशेष लोकप्रिय होते. सविनय कायदेभंगाच्या चळवळीत अनेक वेळा सभांचे अध्यक्ष वा प्रमुख वक्ते म्हणून असत. राष्ट्रीय चळवळीचं प्रतीक म्हणून ते नेहमी गांधी टोपी वापरायचे. शहरातील सर्व प्रमुख कार्यक्रमांमध्ये त्यांचा सहभाग असायचा. सिद्धेश्वर प्रासादिक मंडळ, श्रद्धानंद समाज याठिकाणी त्यांचा वावर होता. सिद्धरामेश्वराच्या यात्रेमधील नंदीध्वज वाहकाचे काम करत असल्याने त्यांच्याभोवती धार्मिक वलयही होतं. रुपाभवानी मंदिर परिसरात पोलीस-आंदोलक संघर्षादरम्यान जमावाला शांत करण्याचं कामही त्यांनी केलं होतं. पण त्याच दरम्यान कलेक्टर हेनरी नाईट यांचा रोष त्यांच्याबाबत तयार झाला होता. स्वातंत्र्य चळवळीच्या धगधगत्या यज्ञकुंडात स्वतःची आहुती देऊन मल्लप्पा धनशेट्टी हुतात्मा झाले. त्यांच्या अस्थी त्यांच्या सहकार्यांनी जपून ठेवल्या होत्या. त्या आजही त्यांच्या जोडभावी पेठेतील स्मारकात आहेत.
2. श्रीकिसन सारडा -
सोलापूर शहरातील सधन व्यापारी म्हणून यांची ओळख होती. सोलापुरातील अनेक सार्वजनिक कार्यक्रमांना ते मोठ्या उत्साहाने मदत करत. यात्रा, सार्वजनिक उत्सव, त्या निमित्ताने होणारे कुस्त्यांचे आखाडे या कार्यक्रमांमध्ये ते आवर्जून सहभागी होत असत. सारडा व मल्लप्पा धनशेट्टी हे चांगले मित्र म्हणून ओळखले जात. राष्ट्रीय चळवळीची आर्थिक बाजू सांभाळत इंग्रज सरकारचा त्यांच्यावर रोष होता. १९१० पासून लोकमान्य टिळकांच्या नेतृत्वाखाली सक्रिय सहभाग. सारडा हे धनाढ्य व्यापारी होते. लोकमान्यांच्या सोलापुरात सभा घेण्यासाठी प्रबोधन व आर्थिक मदत करत. १९१५ साली त्यांनी मोठे योगदान लोकमान्य टिळक यांच्याकडे दिले होते.
3. जगन्नाथ शिंदे -
युवक संघ व मजूर संघ यांचे सेक्रेटरी म्हणून जगन्नाथ शिंदे काम पाहत असत. ते तालीम संघाचेही सेक्रेटरी होते. १८५७ ची स्मृती, बारडोली विजय दिन या कार्यक्रमांचे आयोजन केले होते. प्रेस अॅक्टच्या जाचक अटींबाबत परखड भूमिका मांडली होती. शिंदे यांनी सोलापुरातील युवक वर्ग, कापड गिरणी कामगार व तालीम संघाची पैलवान मंडळी अशी ताकद राष्ट्रीय चळवळीमागे उभी केली. कसरतीने कमावलेलं शरीर यांमुळे त्यांची तरुणांमध्ये विशेष ओळख होती. त्यांनी सोलापूरात राष्ट्रीय चळवळीला सामान्य माणसांच्या घराघरांत पोचवण्याचे काम केलं होतं. अभ्यासू वृत्ती व शैलीदार वक्तृत्व या गोष्टींसाठीही जगन्नाथ शिंदे यांचं नाव घेतलं जाई. ते राहत होते त्या चौकाला शिंदे चौक असे नाव दिले आहे.
4. कुर्बान हुसेन -
फाशीची शिक्षा ठोठावण्यात आलेल्यांपैकी कुर्बान हुसेन हेच सर्वात लहान होते. फ्रेम तयार करण्याचं काम करणाऱ्या कुटुंबात त्यांचा जन्म झाला होता. सुरुवातीला लक्ष्मी विष्णू मिलमध्ये गिरणी कामगार म्हणून त्यांनी कामाची सुरुवात केली. पुढे उत्तम लिखाण आणि वक्तृत्व गुणांमुळे ते सार्वजनिक जीवनात लोकप्रिय झाले.ज्येष्ठ स्वातंत्र्यसैनिक डॉ. अंत्रोळीकर यांचे ते शिष्य. ते ङ्गगजनफरफ नावाचे साप्ताहिक चालवत. कवी कुंजविहारी यांची कविता ङ्गभेटेन नऊ महिन्यांनीफ याच साप्ताहिकामध्ये प्रसिद्ध झाली होती. त्यांनी गझनफर नामक मराठी वृत्तपत्र सुरू केलं होतं. कुर्बान हुसेन यांनी सोलापूरमधील कापड गिरण्यांमधून विखुरलेल्या अठरापगड जातींचा गिरणी कामगार सर्वप्रथम 'कामगार संघा'च्या माध्यमातून एकत्र आणला.
हजारोंच्या संख्येमध्ये असणारे सोलापूरचे गिरणी कामगार राष्ट्रीय चळवळीत सामील झाल्याने राष्ट्रीय चळवळीची ताकद कमालीची वाढली.कोणत्याही
कार्यक्रमात कुर्बान हुसेन यांचं भाषण होणार, हे ठरलेलंच असायचं. त्यांच्या या लोकप्रियतेमुळेच इंग्रज सरकारची वक्रदृष्टी त्यांच्याकडे गेली होती. वरील चौघांना अटक करून त्यांची रवानगी पुण्याच्या येरवडा जेलमध्ये करण्यात आली. इंग्रज सरकारने या चौघांचा मंगळवार पेठ पोलीस चौकी जळीत प्रकरणात कसा सहभाग होता, ते पटवून दिलं. हायकोर्टात न्या. माडगावकर यांनी चौघांच्या फाशीचं जन्मठेपेत रुपांतर करावे, अशी सूचना केली होती. पण इतर ब्रिटिश न्यायाधीशांनी त्याला असहमती दर्शवली. त्यानंतर धनशेट्टी, सारडा, शिंदे आणि हुसेन यांना फाशीची शिक्षा कायम करण्यात आली.
"चार वेगवेगळ्या समाजघटकांमधील तरुणांची नावे वेचून फाशीच्या शिक्षेसाठी निवडण्यात आली. सर्वच समाजांवर ब्रिटिश राजवटीची दहशत बसावी, असा सरकारचा प्रयत्न होता. पण या घटनेतून देशाची राष्ट्रीय एकात्मता दिसून आली. आजही ही घटना राष्ट्रीय एकात्मतेचं प्रतीक आहे."
12 जानेवारीच का?
सोलापूरच्या चार सुपुत्रांना ठोठावण्यात आलेल्या फाशीच्या शिक्षेची अंमलबजावणी करण्यासाठी इंग्रज सरकारने १२ जानेवारी १९३० चा दिवस निवडला होता. सुरुवातीला १३ जानेवारी या तारखेबद्दल विचार सुरू होता. पण नंतर ती बदलून एक दिवस आधीच म्हणजे १२ जानेवारीचा दिवस निवडण्यात आला.

सोलापुरात मकर संक्रातीच्या दिवशी भरवण्यात येणारी श्री सिद्धेश्वर गड्डा यात्रा
सोलापूर शहरात १४ जानेवारी हा संक्रातीच्या सणाचा दिवस मोठ्या उत्सवाचा दिवस असतो. ग्रामदैवत सिद्धरामेश्वर यांच्या या उत्सवाला नऊशेहून अधिक वर्षांचा इतिहास आहे. या दिवशी संपूर्ण शहरात मानाच्या सात काठ्यांची मिरवणूक काढण्यात येते. याला गड्डा यात्रा म्हणूनही ओळखलं जातं. या उत्सवाच्या पार्श्वभूमीवर यापुढे कुणीही ब्रिटिश सरकारविरुद्ध बंड करू नये, लोकांच्या मनात दहशत बसावी या हेतूने १२ जानेवारी १९३१ हाच दिवस निवडला, असं अभ्यासक सांगतात. १२ जानेवारी रोजी सकाळी ६ वाजता चौघांनाही फाशी देण्यात आली. शिवाय चार हुतात्म्यांचे मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात न देता इंग्रज सरकारनेच त्यांच्यावर अंत्यसंस्कार केले. ही बातमी सोलापूरला पोहोचल्यानंतर इतिहासात प्रथमच सिद्धेश्वर यात्रेनिमित्त निघणाऱ्या काठ्यांची मिरवणूक रद्द करण्यात आली होती.
सोलापूरच्या चार हुतात्म्यांच्या या बलिदानामुळे देशातील अनेक स्वातंत्र्यसैनिकाना प्रेरणा मिळाली. तसंच आंतरराष्ट्रीय पातळीवर या घटनेची दखल घेण्यात आली.कामगारवर्गीय सत्ता असलेल्या त्यावेळच्या रशियन नेत्यांनी मार्शल लॉ उठावाचा 'सोलापूर कम्यून' असं संबोधून गौरव केला होता. मॉस्को येथे रेडिओवरून यासंदर्भात बातमी प्रसारित झाली. तसंच हा मुद्दा ब्रिटिश संसदेतही त्यावेळी उपस्थित करण्यात आला होता. ब्रिटिश सरकारचा निषेध म्हणून मजूर पक्षाचे खासदार फेनर ब्रॉकवे यांनी सोलापूरच्या घटनेचा उल्लेख करत गांधी टोपी घालून ब्रिटिश संसदेत भाषण केलं होतं, हे विशेष.
पुढे भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहलाल नेहरू यांनी सोलापूरला भेट दिली होती. सोलापूर हे स्वातंत्र्य ज्योतीने प्रेरित झालेल्या धगधगत्या तरुणाईचे, हुतात्म्यांच्या रक्ताच्या बलिदानाने पवित्र झालेले 'शोला'पूर आहे, अशा शब्दांत जवाहरलाल नेहरुंनी सोलापूरचं कौतुक त्यावेळी केलं होतं.

स्वातंत्र्य आंदोलनासाठी आपल्या प्राणांचे बलिदान देऊन सोलापूरचे हे चार हुतात्मे अजरामर झाले. सोलापूरच्या बस स्थानकापासून दीड किलोमीटर अंतरावर हुतात्मा चौकात या चौघांचे पुतळे उभारण्यात आले आहेत. याच ठिकाणी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचा पुतळा उभारण्यात आला आहे.
स्वातंत्र्यसंग्रामात प्राणाची आहुती देणारे सोलापुरातील हुतात्मे
- मोतीचंद परमचंद शहा
- दगडू तात्या कवले
- सदाशिव श्रीधर कुलकर्णी
- तात्या आवबा जाधव
- नारायण तुळशीराम
- नरसय्या कृष्णय्या त्यारला
- भोलागिरी बुवा
- गंगाराम भडंगे
- फतुसाहेब आवाजी
- कालिदास ओधवजी मिठाईवाला
- तुकाराम व्यंकप्पा कमटम
- गजाभाऊ काशिनाथ रानडे
- भानुदास तुळशीराम लोहार
- रतनलाल हिराचंद शहा
- शंकर सिद्रामप्पा शिवदारे
- सुंदरसिंग गुरुदाससिंग
- गंगाराम साबळे
- मल्लिकार्जुन स्वामी
- भाऊ रेवप्पा हुल्ले
- इरप्पा
हुतात्मा सोलापूर के चार
इतिहास में जगह तक नही!
रक्त मे लावा नही है हम में
पन्ने खंगालने की भूख नही!!
-विठ्ठल रणदिवे
सोलापुर शहराच्या इतिहासाची सविस्तर माहिती घेतल्यावर आता सोलापुर शहरातील एतिहासिक ठिकाणांची माहिती घेउया.
सोलापूरचा भुईकोट इतिहास
सोलापूर शहरात भुईकोट प्रकारचा किल्ला आहे. हा किल्ला ‘सोलापूरचा भुईकोट किल्ला’ म्हणून ओळखला जातो.मध्यकालीन इतिहासामध्ये सोलापूरच्या किल्ल्याला अतिशय महत्वाचे स्थान प्राप्त झाले होते. बहमनींच्या राज्याची शकले उडाल्यावर त्यातून पाच शाह्या निर्माण झाल्या. या पाच शाह्यांनी आपली वेगळी चूल मांडली. या पाचही राजवटीच्या मध्यवर्ती ठिकाणी सोलापूरचे भौगोलिक स्थान होते. त्यामुळे सोलापूरचे महत्त्व वाढले. इतिहासातील अनेक घटनांचा साक्षीदार असलेला सोलापूरचा किल्ल्या अनेक राजवटीचे आश्रय स्थान होता.किल्ल्याच्या बांधणीसंबंधी एक दंतकथा सांगितली जाते. किल्ल्यासाठी जागा शोधण्यासाठी अंमलदारांचा मुक्काम सोलापुरात पडला.हल्लीच्या किल्ल्याच्या जागेतील मल्लिकार्जुन श्री मल्लिकार्जुन देवळाच्या जागेत हिंडणारा कोल्हा त्यांच्या दृष्टीस पडला.त्या कोल्ह्यावर अंमलदारांच्या शिकारी कुत्र्यांची नजर पडली. त्या कोल्ह्यावर कुत्र्यांनी हल्ला केला, मात्र निसर्गक्रमानुसार कोल्हा पळून गेला नाही.पण कोल्ह्याने कुत्र्यावर हल्ला करुन त्यालाच आपल्या हद्दीबाहेर पळवून लावले.हा या जागेचा विलक्षण प्रभाव पाहून अंमलदारांनी किल्ला याच ठिकाणी बांधण्याचे निश्चित केले. पुढे त्या ठिकाणी भुईकोट किल्ल्याची उभारणी झाली. मात्र तो नेमका कोणत्या काळात झाला यामध्ये संशोधकांमध्ये वेगवेगळी मते आढळून येतात.
तसेच जवळपास १६९४ ते १६९९ दरम्यानच्या काळात जवळपास साडेचार वर्षे सोलापूर व परिसरात वास्तव्य होते. कारण इथून स्वराज्यावर हल्ले करणे सोपे होते शिवाय जवळ होते. व भीमा व सीना नद्या असल्याने इतर सुविधा देखील सहज मिळत होत्या. मंगळवेढा रोडवर बेगमपूर हे गाव देखील औरंगजेबने वसवले व त्यासाठी आपल्या बेगमच्या नावाने बेगमपूर नाव ठेवले, ह्याच ठिकाणी काही दिवस वास्तव्यास होते, कारण शहराबाहेर राहून नदीच्या किनारी राहत, व सैन्याला व राण्यांना संरक्षण करण्यासाठी सैन्याला देखील ह्या जागा व्यवस्थित होत्या. तसेच सोलापूर मध्ये असलेल्या कंबर तलाव जीर्णोद्धार औरंगजेबने केला, सोलापूर मध्ये असलेल्या सिद्धेश्वर तलावचा देखील जीर्णोद्धार औरंगजेबने केला होता. त्याकाळी गाळ काढून शहर वासीयांना पाणी कमी पडू लागल्याने बेगमपेठ शेजारील जेल मागे एक विहीर खोदून त्याची बांधणी करून सोलापूरकर साठी औरंगजेबने पाण्याची सोय केल्याच्या नोंदी आढळतात.
सोलापूर किल्ला त्याला खूप आवडतं असल्याने त्याने किल्ल्या भोवतीचे खंदक खोदकाम करत मधील दुरुस्ती करून किल्ल्याला मजबुती केलेली होती, काही ठिकाणी पडलेला भाग दुरुस्त करून घेतलेला होता. शिवाय त्याकाळी म्हणजे १६९५ ते १६९९ दरम्यान सोलापूर येथे विजापूर वेस मधील मशीदमध्ये येऊन नमाज अदा करत असे. अशी मशीद मोठी नव्हती पण त्या काळी असलेल्या भागात नमाज अदा करत. तसेच सध्या सोलापूरचे रेल्वे स्टेशन आहे, त्याजागी पूर्वी एक चौथरा होता, त्यावर औरंगजेबचा तंबू असे, व त्याच्या आसपास त्याचे काही सैन्य राहत असे. जोपर्यंत नमाज व इतर काम असे त्यासाठी लागणारे मोजक्याच सैन्याला सोबत घेऊन औरंगजेब सोलापूर शहरात नेत असे, व उर्वरीत सैन्य रेल्वे स्टेशन च्या जागी असलेल्या तंबूजवळ ठेवी, आणि लढाऊ साठी नियुक्त असलेल्या सैन्याला पंढरपूर कडे असलेल्या वास्तव्याच्या जागी ठेवत असे.
त्याच्या बेगमराणी देखील नमाज अदा करण्यासाठी सोलापूर मध्ये येत असत, सोबत दासी असत त्यांचा मुक्काम मशीद जवळ असत, त्या जागेस विजापूर वेस बाहेर बेगमपेठ नावाने वसवले व त्या ठिकाणी बांधकामे करण्यात आली. आता देखील त्याच नावाने भाग ओळखला जातो. त्यानंतर ज्यावेळी रमजान महिना असे त्यावेळी महिनाभर बेगमराण्यासह व सैन्य सोबत घेऊन सोलापूरमध्ये राहत असे, त्यावेळी सैन्याला खाण्यापिण्यासाठी व कपडेलत्ते खरेदीसाठी सोलापूर मधील विजापूर वेस जवळपास छोटी छोटी दुकाने मांडत त्यात साडी चोळी, कपडे, चप्पल, बूट, इतर साहित्य , घरगुती वस्तू कमीत कमी किंमतीत मिळत, व सैन्य दासी येथेच खरेदी करत, तसेच ह्याच ठिकाणी रमजान उपवास साठी मिठाई देखील असे. सुकामेवा बदाम, काजू, केशर, खजूर हे देखील अरब व अफगाणिस्तान कश्मीर कडून आणून व्यापारी कमीतकमी किंमतीत विकत असत. ह्याचीच परंपरा म्हणून १६९५ पासून अजून देखील दरवर्षी महिनाभर विजापूरवेस, बेगमपेठ मध्ये हा बाजार दर रमजानच्या महिन्यात भरतो, सर्वजण मुस्लिम समाज सोबतच इतर समाज देखील येथे वस्तू कपडेलत्ते खरेदी करतात.
त्याशिवाय महत्वाचे म्हणजे सोलापूर किल्ल्याच्या मध्ये सुगंधी फुलांच्या बागा होत्या, त्या औरंगजेबच्या निरीक्षणात असत, त्याच्या सूचनेनुसार चालत. त्यामुळे ती फुले दररोजची तोडून ‘सोलापूर ते अफगाणिस्तान, व अरब भागात’ दररोज रवाना केली जात असे.
मराठा मुघल संघर्ष सोलापूर भुईकोट किल्ला छ.संभाजी कालखंड
१६८० च्या आँक्टोबर महिन्यात ज्या वेळी औरंगाबाद व पेडगावला फौजेची नेमणूक झाली त्याच वेळी संभाजी राजांना सोलापूर येथेही सैन्य धाडण्याची व्यवस्था केलेली होती.. त्यामुळे खानजहान बहादूरने आपला डेरा उठविली. ज्या वेळेस मुहम्मद आज्जमशहा औरंगाबाद च्या सुभ्यात पोचणार होता त्या वेळी खानजहान बहादूर मराठ्यांना तंबी देण्यासाठी कूच करणार होता..यावेळी मराठ्यांचा फौज सोलापूर किल्लाजवळ गेली.प्रचंड संघर्ष झाले. नोव्हेंबरच्या अखेरील संभाजी राजानी ६००० स्वारांची फौज सोलापूर उद्ध्वस्त करण्यासाठी रवाना केली. ती सोलापूरला पोचताचा मोगल किल्लेदार राजा मनोहरदास गौड किल्लावरुन मराठ्यांचा मुकाबला करण्यासाठी निघाला, खानजहान बहादुदुरने रजबखानाला मनोहरदास गौडच्या मदतीसाठी पाठविले. मराठे व मुघल यांच्यात लढाई होऊन मराठ्यांचे बरेच लोक कामास आले…
१६८३ च्या एप्रिल महिन्यात मनोहरदास गौडचा मुलगा किशोरदास याला सोलापचा किल्लेदार नेमण्यात आले , १६८५ च्या एप्रिल महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात छ. संभाजी महाराजांचे एक सरदार सुदजी सोलापूर तालुक्यात घुसला होता. व मुघलांना प्रचंड लुटला. तेव्हा औरंगजेब यांना शिरवळच्या अबु मह्हमुद ठाणेदारना रवाना करून लवकर जाऊन मराठ्यांचा सोलापूर येथे पराभव करण्यासाठी सांगितले. ठाणेदार दि. २२/४/१६८५ रोजी तेथे पोचला. मराठे व मोगली सैन्यात लढाई होऊन दोन्ही बाजूंनी अनेक जण मेले व जखमी झाले. यावेळेस मराठ्यांनी माघार घेतली मराठ्यांनी लुटलेल्या सामानपैकी ३१ घोडे आणि भाले मुघलांच्या हातात सापडले. तसेच मराठ्याचे सरसेनापती हंबीरराव मोहित हे सोलापूर परिसरात याचा कालखंडात येऊन गेले असलेच नोंद सापडले.
सोलापूर भुईकोट किल्ला येथून मूघलचे तोफांखाना होते तसेच टाकसाळं पण याचा किल्लावर होते शिवाय महाराष्ट्र व कर्नाटक व आंध्र प्रदेश च्या सरहद वरील प्रमुख लष्कर ठाणे सोलापूर आहे येथून चौफार घोडदौड करण्यासाठी महत्त्वाचे ठिकाण आहे म्हणून छत्रपती संभाजी महाराज व मराठ्यांचा वावर सतत या परिसरात दिसुन येते. तसेच याचा प्रदेशातून मोगली सैन्यासाठी रसद व कामुक (धन्य साम्रगी) येत असल्याचे नोंदी उपलब्ध आहेत त्या मोगलांना भेट नयेत म्हणून याभागात मराठे सतत वावरातुन दिसतात.
इंग्रज राज्याचे स्थापनेनंतर लढाईचेतंत्र बदलले.किल्याची जरुरी वाटेनाशी झाली.त्यामुळे किल्ला पाडण्याची कल्पना उद्भवली.मात्र सोलापूर नगरपालिकने १८८६ साली गव्हर्नर आल्यानंतर शहराचे ऐतिहासिक वैभव पाडले जाऊ नये म्हणून खपट केली.त्याचा उपयोग झाला आणि किल्ला बांधण्याची कल्पना इंग्रजानी सोडून दिली.म्हणूनच आज हा किल्ला पहावयास मिळतो आहे.
भुईकोटाची भटकंती :-
शहरात शिरल्याबरोबर मधोमध वसलेला हा गड आपले लक्ष वेधून घेतो. दुहेरी तटबंदी, त्याभोवती खंदक आणि खंदकानंतर पुन्हा तट, अशी चिलखती रचना असलेला हा एक भक्कम कोट! अशा या गडात शिरण्यासाठी उत्तरेकडून मूळ मार्ग होता. मात्र आज तो बंद केल्याने पश्चिमेकडील नव्या मार्गानेच गडात दाखल व्हावे लागते. मुख्य प्रवेशद्वार हे सध्याच्या सावरकर मैदानाच्या बाजूने आहे.किल्ल्याला तीन बाजूनी खंदकाने वेढलेले आहे.किल्ल्याच्या चौथ्या बाजूला सिध्देश्वर मंदिर आणि तलाव आहे. किल्ल्याला निश्चित असा काही आकार नाही. किल्ल्याचा परिसर मोठा आहे. किल्ल्यात जाण्यासाठी पाच रुपयांचे तिकिट आहे. आतमध्ये बाग आहे, पण देखभाल होत नसल्याचे जाणवले. किल्ल्याचा विस्तार प्रचंड असून सध्या किल्ल्यातील काही भागात जनतेसाठी बाग तयार करण्यात आली आहे.. सध्या या बागेत इंग्रजकालीन तोफा नजरेस पडतात..




काही वर्षांपर्यंत याच दरवाजातून गडात प्रवेश व्हायचा, पण आता हा दरवाजा बंद केलेला आहे. गोमुखी रचना, भोवताली आक्रमक बुरूज आणि आत शिरण्यासाठी मोठय़ा दरवाजाला दिंडी ठेवलेली! असा हा दरवाजा इसवी सन १८१० मध्ये दुरुस्त केल्याचा उल्लेख असलेला एक पितळी लेख या दरवाजावर होता अशी नोंद आहे. पण सध्या तो दिसत नाही.
पहिला तट, मग खंदक आणि त्यानंतर ती दुहेरी तटबंदी ओलांडतच आत शिरायचे. आत शिरताना भुईकोटाच्या या अजस्र रूपाचेच मनावर दडपण येत असते. ते मुस्लीम दुर्गस्थापत्यातील भरभक्कम बुरूज, त्याच्यावरचे ते आक्रमक सज्जे, मारगिरीच्या जागा हे सारे इतिहासकाळाचे दडपण वाढवते.

किल्ल्यातील दोन मजली इमारतीवर नाजूक मिळणार आहेत किल्ल्यातील दरवाजा दोन वेळा हलविला सुरुवातीला किल्ल्यात पाच फूट उंचीची भिंत बांधलेली होती तर इंग्रजांनी दुसऱ्यांदा दरवाजावर राहण्यासाठी खोली व तिला एक मोठी खिडकी बांधली


महांकाळेश्वर आणि शनिश्वर मंदीर


रेवणी दरवाजा



सोलापूर भुईकोट किल्ल्यामधील मराठी भाषेतील शिलालेख.
या शिलालेखेत उल्लेख केल्यानुसार ‘रामनाथ’ म्हणजे सोलापूरचे श्री सिद्धरामेश्वर महाराज होय. कारण श्री सिद्धरामेश्वर महाराज हे एक महाशिवयोगी कुलचक्रवती होते. त्यांनी श्रीशैल यात्रा करून सोलापुरात आल्यानंतर आपल्या परमदेवतेचे म्हणजेच श्री कपिलसिद्ध मल्लिकार्जुनाच्या मंदिराची निर्मिती सोलापुरातील भुईकोट किल्ल्यामध्ये केली.
सोलापूर येथील भुईकोट किल्ल्यामध्ये १५ शिलालेख आहेत. यामध्ये मोडी, पर्शियन उर्दू , देवनागरी भाषेतील शिलालेख आहेत. त्यातील एक मराठी भाषेतील(देवनागरी लिपीतील) या शिलालेखामध्ये स्पष्ट शब्दात श्री. सिद्धेश्वर महाराजांच्या नावाचा उल्लेख असलेला किल्ल्यातील एकमेव शिलालेख आहे.अशा प्रकारचा अत्यंत महत्त्वाच्या या शिलालेखाचे जतन व संवर्धन करणे गरजेचे आहे.


मंदिराच्या डावीकडे काही अंतरावर एक वास्तू आहे. तिला ३२ खांब असल्याने ३२ खांबी मस्जिद म्हणले जाते. येथील कोरीव खांब, नक्षीयुक्त सजावटीने नटलेले आहेत. वास्तुमध्ये आत समोरून थंड हवा येण्यासाठी एक फट ठेवलेली पहावयास मिळते.





| Year of manufacturing carved on the cannons |
| Monogram of the Rulers on the cannon |

तिसरी विहीर ही गोड्या पाण्याची विहीर म्हणून ओळखली जाते. विहिरीत पाण्यापर्यंत जाण्यासाठी दोन मार्ग (सोपान) आहेत. ही विहीर चौकोनी आकाराची असून, बरीच खोल आहे. ऐतिहासिक भुईकोट किल्ल्यात आदिलशहाच्या काळात तयार झालेली विहीर काटेरी झुडपांमध्ये दडली होती. ही विहीर आता पाहण्यासाठी मोकळी झाली. बांधकामाचा उत्कृष्ट नमुना असलेल्या या विहिरीचे संवर्धन करण्याची आवश्यकता असल्याचे केंद्र शासनाच्या निधीतून भुईकोट किल्ल्याच्या संवर्धनाचे प्रयत्न सुरू आहेत. किल्ल्यातील काटेरी झुडपे हटविण्यात आली. सोलापुरातील सामाजिक संघटनांनी यासाठी आठवड्यातून एकदा श्रमदान केले. राज्याच्या विविध भागातील शिवप्रेमी यात सहभागी झाले. झाडीझुडपे हटविण्यासाठी बरेच श्रम करावे लागले. पुरातत्त्व विभागाचे कर्मचारी झटले. अद्याप बरेच काम बाकी असले तरी या
मोहिमेतून काही चांगल्या गोष्टी घडत आहेत.भुईकोट किल्ल्यात अनेक ऐतिहासिक वास्तू आहेत. दस्तावेजात त्याची नोंद आहे. काटेरी झुडपांमुळे आणि पडझड झाल्यामुळे त्या झाकोळल्या गेल्या आहेत. नव्या स्वच्छता अभियानामुळे अशा अनेक वास्तू इतिहासप्रेमींना पाहण्यासाठी खुल्या होत आहेत. त्यापैकीच एक म्हणून तिसºया विहिरीकडे पाहता येईल.भुईकोट किल्ल्यात एकूणच चार विहिरी आहेत. बाळंतीण आणि नागबावडी या दोन विहिरी खुल्या आहेत. मल्लिकार्जुन मंदिरासमोर तिसरी विहीर असल्याचे सांगितले जायचे. मात्र लोकांना तिथे पोहोचता येत नव्हते.स्वच्छता अभियानामुळे ही विहीर खुली झाली आहे. भोवताली बरीच स्वच्छता करून घेण्यात आली आहे. अभ्यासकांच्या नजरेतून या विहिरीचे वैशिष्ट्य इतिहास अभ्यासक नितीन अणवेकर म्हणाले, तिसरी विहीर ही गोड्या पाण्याची विहीर म्हणून ओळखली जाते. विहिरीत पाण्यापर्यंत जाण्यासाठी दोन मार्ग (सोपान) आहेत. ही विहीर चौकोनी आकाराची असून, बरीच खोल आहे. विहिरीच्या भोवती कठडा नाही. मल्लिकार्जुन मंदिराच्या समोरील बाजूस असणारी ही विहीर विजापूरच्या आदिलशहाच्या काळात १६५३ साली तयार झाली आहे. विहिरीवर एक शिलालेख होता. त्यावरही याबाबतची नोंद आहे. किल्ल्यात जलव्यवस्थापनाचे अत्यंत महत्त्वाचे स्थान असते. किल्ला बांधताना पाणीपुरवठ्याची सोय व्हावी म्हणून किल्ल्यातच विहीर आणि बारवाचे बांधकाम केले जात असे. बाळंतीण विहिरीतून खापरी पन्हाळीद्वारे किल्ल्यात जागोजागी पाणीपुरवठा होत होता. मध्ययुगीन काळात आधुनिक पुलाच्या बाजूला नागबावडी ही विहीर झाली. गोड्या पाण्याची विहीर पाहण्यासाठी खुली होणे खूप महत्त्वाचे आहे. आता या विहिरीचे संवर्धन होणे आवश्यक आहे.
-नितीन अणवेकर, इतिहास अभ्यासक
राहाण्याची सोय : सोलापूर शहरात राहण्याची व्यवस्था उपलब्ध आहे.
पाण्याची सोय : किल्ल्यात सध्या पाणी नसल्याने पाणी सोबत ठेवावे.
जेवणाची सोय : सोलापूर शहरात जेवणाची व्यवस्था उपलब्ध आहे.
श्री सिद्धरामेश्वर महाराज :-

श्री सिद्धरामेश्वर आणि प्रत्यक्ष गुरुभेट !
श्री सिद्धरामेश्वर वयाच्या १५ व्या वर्षांपर्यंत एकही शब्द बोलले नव्हते. ते त्यांच्या सवंगड्यांसह गुरे राखण्यास जात असत. एके दिवशी गुरे राखण्यास गेल्यानंतर श्रीशैलहून मल्लिकार्जुन एका जंगमाच्या रूपात सिद्धरामेश्वर यांच्या समोर आले. ‘हे जंगम साक्षात् परमेश्वर आहेत’, हे सिद्धरामेश्वरांनी त्वरित ओळखताच मल्लिकार्जुनांनी तेथेच त्यांना प्रत्यक्ष दर्शन दिले. त्या वेळी मल्लिकार्जुनांनी स्वत: श्रीशैल येथे रहात असून माझे नाव ‘मल्लय्या’ आहे, असे सांगितले. मल्लय्या यांनी सिद्धरामेश्वरांना दहीभात खाण्यासाठी मागितला; मात्र त्या दिवशी सिद्धरामेश्वर दहीभात आणण्यास विसरले होते. त्या वेळी ‘‘मी घरी जाऊन दहीभात घेऊन येतो, तुम्ही येथेच थांबावे’’, असे सिद्धरामेश्वरांनी सांगितले. घरी जाऊन आईला दहीभात देण्यास सांगितले. आपला मुलगा प्रथमच बोलला, हे पाहून आईला अत्यानंद झाला. सिद्धरामेश्वर दहीभात घेऊन मल्लय्यांकडे गेले; मात्र ते तेथे नाहीत, हे पहाताच त्यांचा शोध घेऊ लागले. त्यानंतर ते मल्लय्यांच्या शोधात रडत रडत श्रीशैलकडे निघाले. श्रीशैल पर्वतावर ‘मल्लय्या, मल्लय्या’ अशी हाक मारत व्याकुळ होऊन त्यांचा शोध घेऊ लागले. शेवटी निराश होऊन एका उंच पर्वत कड्यावरून खोल दरीत प्राणत्याग करण्याच्या निश्चयाने उडी घेतली, तोच परमेश्वराने अंधातरी उचलून पर्वतावर आणून त्यांना प्रत्यक्ष दर्शन दिले. परमेश्वराने स्वत: गुरुरुपात त्यांना उपदेश केला.
सोलापूर सिद्धेश्वर मंदिर इतिहास – आख्यायिका
आख्यायिकेनुसार, एकदा सोलापूरला भीषण दुष्काळाचा फटका बसला होता. श्रीशैलम मल्लिकार्जुन स्वामींचे उत्कट भक्त सिद्धरामेश्वर यांनी ४००० स्थानिकांच्या मदतीने एक तलाव तयार करण्यासाठी पृथ्वी खोदली. भगवान शिवशंकरांनी स्वत: ला जंगम स्वामींच्या स्वरूपात येवून सिद्धरामेश्वराजवळ जाऊन सांगितले की , “मी श्रीशैलम इथून आलो आहे आणि श्रीशैल मल्लिनाथ यांनी मला बोलावले आहे.” भगवान शिव म्हणाले की, त्यांना भूक लागली आहे आणि त्यांनी त्यांना रोटी मागितली. रोटी खाल्ल्यानंतर, भगवान शिवाने सिद्दारामाला दही मागितले कारण रोटीमुळे पोटात जळजळ होत आहे. सिद्धरामेश्वर दही आणायला बाहेर गेले, परतल्यावर त्याला मल्लन्ना सापडला नाही. श्रीशैलमला जात असलेल्या जंगम स्वामी जी गटाशी सिद्धरामने संपर्क साधला. जंगम स्वामींनी सिद्धरामय्या यांना सांगितले की ते त्यांना श्रीशैल मल्लाना दाखवतील. ज्योतिर्लिंग दर्शन घेतल्यानंतरही सिद्धरामांना आनंद झाला नाही. श्रीशैला मल्लिनाथ न सापडल्याने तो सतत रडला. असे मानले जाते की, सिद्धरामाच्या अश्रूंनी रिकामे तलाव पाण्याने भरले. श्रीशैला मल्लन्नाकडून परत काहीही न ऐकल्यामुळे सिद्धरामय्यांनी खोऱ्यातून रुद्रकड्यावरून उडी मारण्याचा विचार केला. मात्र भगवान शिवांनी त्यांची सुटका केली आणि परत सोलापूरला जाण्यास सांगितले आणि त्यांच्या विनंतीनुसार मी प्रकट होईल असा वर दिला. राजा नानप्पा आणि राणीच्या मदतीने चमला देवीने भगवान शिवासाठी मंदिर बांधले. सिद्धरामांनी मंदिर आणि आजूबाजूला ६८ लिंगांची स्थापना केली. मंदिराला चारही बाजूंनी पाण्याने वेढलेले आहे . सिद्धराम हे लिंगायत संत आहेत. नंतर त्यांनी समाधीमध्ये प्रवेश केला.पाणी टंचाईवर तोडगा
इसवी सण ११५० च्या जवळ सोलापूर म्हणजेच तेव्हाच्या सोन्नलगी गावात दुष्काळ पडला. त्यावेळी चामलादेवी यांनी सिद्धरामेश्वर यांना तलावासाठी जागा देण्याची विनंती केली. तलावामुळे पाणी मिळेल तसंच हे काम करणाऱ्यांना रोजगार मिळेल असं त्यांचं मत होतं. त्याचबरोबर बहामनी सुलतानाचे राज्य असताना सोलापुरात तलावाच्या शेजारी किल्ला बांधावा त्यामधील मोटद्धवारे किल्ल्याला पाणी देता येईल,असे त्यांनी सांगितले. त्यानंतर त्यांनी सोलापूरमध्ये तलावाच्या शेजारीच किल्ला बांधला. सोलापूरकरांना आजही पाण्याची टंचाई जाणवते. सोलापूरकरांची ही अडचण ओळखून सिद्धेश्वर महाराजांनी हा तलाव उभा केला. त्यांचा मानवतावादी दृष्टीकोन यामधून दिसतो.
मंदिर रचना
सिद्धेश्वर मंदिराच्या सभोवतालचा परिसर हा १४ व्या शतकात पूर्ण केला असावा. तसंच सध्याचे मंदिर पेशवेकालीन आहे, असे मानले जाते. या मंदिरातील कमानी, बसके गुंबज, शिखरावर असणाऱ्या विशिष्ट मुर्ती आणि काही प्रमाणातील कोरीव काम हे सर्व पेशवेकालीन मंदिरामध्ये आढळते. अन्य मंदिराप्रमाणे सिद्धेश्वर मंदिराचे तोंडही पूर्वेकडं आहे. गर्भग्रह ,अंतराळ आणि मंडप अशी रचना आहे. मंदिराच्या मध्यभागी कोणतेही खांब नाहीत. नव्या मंदिराच्या पुढच्या अंगणाचे बांधकाम हे आप्पासाहेब वारद यांनी 19 व्या शतकाच्या उत्तरार्धात पूर्ण केले. सोलापूरचे अष्टविनायक आणि भैरव यांची स्थापना सिद्धरामेश्वर यांनी केली. ज्या रागवंकांनी सिद्धेश्वरांचे चरित्र लिहिले त्यामध्ये त्यांनी असा उल्लेख केला आहे त्यापैकी ज्यावेळी किल्ल्याचे बांधकाम चालू होते त्यावेळी ह्या १६ लिंगांची रचना केली असावी. आणि सतरावे लिंग हे तेलेश्वर म्हणजेच नॉर्थकोटच्या मागच्या बाजूस असणारे लिंग मंदिर येथे बांधण्यात आले असावे.
यात्रेची परंपरा कथा :-
श्री.सिद्धेश्वर हे सोलापूर शहराचे ग्रामदैवत आहे. शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी सिद्धेश्वर मंदिर आहे. हे एका मोठ्या पाण्याच्या टाकीने वेढलेले आहे जे बेटाच्या दृश्यासारखे दिसते. श्री.सिद्धेश्वर यांचा थोडक्यात इतिहास असाच चालतो. श्री.बसवेश्वरांच्या शिकवणीचा उपदेश करणारे थोर संत श्री.सिद्धराम होते.सिद्धेश्वर महाराज प्रतिदिन ध्यानधारणा करत, तेव्हा त्यांच्या साधनागृहाबाहेर सडासंमार्जन करून रांगोळी रेखाटली जात असे. ‘ही सेवा कोण करते ?’, याचा शोध लागत नसे. एके दिवशी सिद्धेश्वर महाराज साधनागृहातून लवकरच बाहेर आले असता सुंदर कुमारिका सडासंमार्जन करून रांगोळी घालत होती. महाराजांनी तिची विचारपूस केली, तेव्हा तिने स्वत: कुंभारकन्या असल्याचे सांगून त्यांच्यासमवेत विवाह करण्याची इच्छा व्यक्त केली. ब्रह्मचर्य जपायचे असल्याने महाराजांनी विवाहास नकार दिला; परंतु कुंभारकन्येचा हट्ट पहाता त्यांनी स्वत:च्या योगदंडासमवेत विवाह करण्यास अनुमती दिली. हाच प्रतिकात्मक विवाह सोहळा प्रतिवर्षी सिद्धेश्वर यात्रा म्हणून मकरसंक्रांतीच्या काळात भोगी, संक्रांती आणि किंक्रांती या ३ दिवसांत साजरा केला जातो.
नंदीध्वजांना लग्नासाठी वधू आणि वर मानले जाते. हा उत्सव दरवर्षी १४ जानेवारीच्या सुमारास येतो. हे आगळेवेगळे लग्न दरवर्षी सोलापुरात साजरे होते. सोलापुरात मकरसंक्रांतीच्या भोगी, मकरसंक्रांत, किंक्रांत या तिन्ही दिवशी श्री सिद्धेश्वरांची गड्डा यात्रा मोठ्या उत्साहाने साजरी केली जाते. गेल्या ९०० वर्षांपासून ही परंपरा अखंड सुरू आहे.
गड्डा जत्रा म्हणून प्रसिद्ध असलेल्या जत्रेची व्यवस्था या काळात पंधरा दिवस केली जाते. सिद्धेश्वर मंदिर ही सोलापूरची एक प्रमुख ओळख आहे. जानेवारी महिन्यात सिद्धेश्वर मंदिरात सोलापूरची यात्रा असते. संक्रातीच्या दिवशी या यात्रेचा मुख्य दिवस असतो. या कालावधीमध्ये जगभरातील सोलापूरकर आवर्जून सिद्धेश्वरच्या दर्शनासाठी येत असतात. त्याचबरोबर शेजारच्या जिल्ह्यांमधील अनेक भाविकही इथं गर्दी करतात.



दुसर्या दिवशी संध्याकाळी होमप्रदीपन सोहळ्यासाठी हिरेहब्बू वाड्यातून नंदीध्वजांची मिरवणूक सुरू होते. नंदीध्वजांना विद्युत रोषणाई करण्यात येते. हे नंदीध्वज रात्री १० च्या सुमारास होम मैदानावरील होमकुंडाजवळ पोहोचतात.
‘गड्डा यात्रे’चे प्रमुख ७ नंदीध्वज आहेत. त्यांच्या सरावाचे ७ असे १४ अधिकृत आणि मान्यता दिलेले नंदीध्वज आहेत. वर्षभर हे नंदीध्वज विशेष निगराणीत ठेवलेले असतात. पहिला नंदीध्वज श्री सिद्धेश्वर देवस्थानचा असून तो २८ फूट उंच आहे. दुसरा कसब्यातील देशमुखांचा, तिसरा लिंगायत-माळी समाजाचा, चौथा आणि पाचवा विश्व ब्राह्मण समाजाचा, सहावा आणि सातवा मातंग समाजाचा असतो. भोगीच्या आदल्या दिवशी सोलापूर शहर परिसरातील श्री सिद्धरामेश्वरांनी स्थापन केलेल्या ६८ शिवलिंगांना तेल अर्पण केले जाते. या वेळी मानाच्या नंदीध्वजांची मिरवणूक शहरातून काढली जाते. त्यासाठी विशेष पोशाख परिधान केलेला असतो. त्या पोशाखाला ‘बाराबंदी’ म्हणतात. हा सोहळा दिवसभर चालतो. नंदीध्वज घेऊन चालणे, हे अत्यंत कठीण काम आहे; कारण उन्हात अनवाणी पायाने चालावे लागते. हे उंच नंदीध्वज घेऊन चालण्यासाठी किमान १ मास आधीपासून सराव केला जातो.
होम हवनाचा आणि कुंभार कन्येच्या अग्नीप्रवेशाचा कार्यक्रम होतो. होमहवनानंतर भाकणुकीचा कार्यक्रम होतो. नंतरच्या दिवशी होम मैदानावर रात्री ८ नंतर शोभेचे दारूकाम होते. सिद्धरामेश्वर मंदिराभोवती प्रदक्षिणा करून धार्मिक विधी संपन्न होतात. दुसर्या दिवशी नंदीध्वजाचे वस्त्रविसर्जन (कप्पडकळी) आणि प्रसादवाटप होऊन धार्मिक कार्यक्रमांची सांगता होते.मकरसंक्रांत आणि त्यासोबत येणारी गड्ड्याची यात्रा हा सर्व सोलापूरकरांच्या जिव्हाळ्याचा विषय आहे!!
भोगीच्या दिवशी सकाळी हिरेहब्बू वाड्यातून नंदीध्वज मार्गक्रमण करत ते श्री सिद्धेश्वर मंदिरात येतात. त्यानंतर संमती कट्टामार्गे शहरातील विविध भागांतून मल्लिकार्जुन मंदिरापर्यंतचा १३ किलोमीटरचा प्रवास १० ते ११ घंट्यांत पूर्ण करतात. ७ नंदीध्वजांमधील पहिला नंदीध्वज २८ फूट उंच आहे. त्यास अनुमाने १० फुटांपर्यंत लिंबू आणि खोबर्याच्या वाट्या भक्तांकडून बांधल्या जातात. नंदीध्वज हे विवाहासाठी प्रतिकात्मक वर आणि वधू मानले जातात. भोगीच्या दिवशी अक्षता सोहळा पार पडतो. हिरेहब्बू यांच्या घरापासून निघलेली मिरवणूक दाते गणपतिपासून सिद्धेश्वर प्रशालामार्गे दुपारी १ वाजता संमती कट्टयावर सातही नंदीध्वजांसह येताच ‘सिद्धेश्वर महाराज की जय&हर्र बोला हर्र’चा जयघोष होतो. त्यानंतर योगदंडाच्या साक्षीने सुगडीपूजा आणि गंगापूजन करून १२ मडक्यांमध्ये पाणी भरून त्यासमोर पानाचा विडा ठेवण्यात येतो. कुंभार घराण्यातील मानकर यांना हा विडा दिला जातो. त्यानंतर ८ ते १० मिनिटांच्या अक्षता सोहळ्यास प्रारंभ होतो. कन्नड भाषेतून ५ वेळा संमती वाचन केले जाते. प्रत्येक कडव्याच्या शेवटी ‘सत्यम्&सत्यम्’ असे उच्चारण होताच लाखो भाविक त्या घोषात अक्षतांचा वर्षाव करतात. या वेळी तुतारी, नगार्याचा निनाद केला जातो. त्यानंतर नंदीध्वज अमृतलिंगाजवळ येतात. अत्यंत नयनरम्य अशा या सोहळ्याचे वातावरण ‘एकदा भक्तलिंग हर्र बोला हर्र’ या उद़्घोषांनी भक्तीमय झालेले असते.
मकरसंक्रांतीच्या दिवशी होमहवन विधी !
योगदंडाशी विवाह केल्यानंतर कुंभारकन्या सती गेली. होमविधीच्या म्हणजे संक्रांतीच्या दिवशी मंदिराच्या समोरील होम मैदानावर होमहवन केला जातो.
नंदीध्वजांच्या वस्त्र विसर्जनाच्या (कप्पडकळी) कार्यक्रमाने यात्रेची सांगता !
किंक्रांतीच्या दिवशी होम मैदानावर शोभेचे दारूकाम केले जाते. हा सोहळा पहाण्यासाठी आबालवृद्ध वेगवेगळ्या गावांतून उपस्थित रहातात. किंक्रांतीनंतर दुसर्या दिवशी श्री मल्लिकार्जुन मंदिरात नंदीध्वजांच्या वस्त्र विसर्जनाच्या (कप्पडकळी) कार्यक्रमाने यात्रेतील धार्मिक कार्यक्रमाची सांगता करण्यात येते.
रुपाभवानी :-
सोलापूरातील रुपाभवानीचे देऊळ मोठे आहे. त्या देवळातील आतील भाग दगडी व कलाकुसरयुक्त आहे. त्या मंदिराचे बांधकाम व त्यावरील रंगीत शिखराचे काम ‘श्री रूपाभवानी भक्त मंडळ’ व ‘श्री वल्लभदास अग्रवाल’ यांच्या सहकार्याने झाले.रुपाभवानी देवीला सुंदर पितळी मुखवटाही आहे. देवीच्या मंदिरात नवस फेडले जातात. विशेष म्हणजे मुस्लिम स्त्रीपुरुषही नवस फेडण्यासाठी आलेली दिसतात. सोलापूरात दुर्गामातेची तीन रुपे विशेष प्रसिद्ध आहेत. एक सोलापूर शहरातील रुपाभवानी, दुसरी माढ्याची माढेश्वरी देवी आणि तिसरी करमाळ्याची श्री कमला देवी.
कंबर तलाव :-

सोलापूर - विजापूर महामार्गावरून जाताना तलावाच्या काठावर उभारण्यात आलेला झाशीच्या राणीचा अश्वारूढ पुतळा लक्ष वेधून घेतो. हा अतिशय रम्य असा तलाव आहे. या तलावात कमळे फुलतात म्हणून त्याला कमळ तलाव असे म्हणण्याची प्रथा होती. पुढे या तलावाला कंबर तलाव म्हटले जाऊ लागले.
ब्रिटिश सनदी अधिकारी अॅलन ह्यूम यांच्या मते या तलावाची निर्मिती ३ ते ४ हजार वर्षापूर्वी झालेली आहे. एखादा उल्कापात होऊन मोठा खड्डा पडतो आणि तिथे पाण्याचे झरे फुटून तलाव निर्माण होतो तसा हा तलाव उल्कापातातून निर्माण झालेला आहे असे ह्यूम यांचे म्हणणे आहे. या तलावात अजूनही जिवंत झरे आहेत. सोलापूर शहरात धर्मवीर संभाजी जलाशय (कंबर तलाव), त्याचा परिसर आणि स्मृती उद्यान ही नवी पर्यटन स्थळेच झाली आहेत. त्यांच्यामुळे सोलापूरचं निसर्गवैभव निश्चितच वाढलंय. स्मृती उद्यान हा तर अख्या महाराष्ट्रातला अग्रेसर प्रकल्प ठरला आहे !
संभाजी तलाव हा एक निसर्गरम्य परिसर आहे. या परिसरात थंडीच्या दिवसांत हजारो स्थलांतरित पक्षी आश्रयाला येत असतात. यातले काही पक्षी तर उत्तर ध्रुवावरून येत असतात. नामवंत पक्षी तज्ज्ञ सलीम अली यांना आणि पक्षी जीवनाचा अभ्यास करणार्या विहंगप्रेमींना ही जादूईनगरी वाटते. या परिसरात आता एक सुरम्य स्मृती उद्यान उभं राहिलं आहे. अनेक निसर्गप्रेमी पर्यटक आता या उद्यानाला मुद्दाम भेट देतात. ज्येष्ठ नागरिकांसाठी ते विरंगुळ्याचं चिंतनाचं ठिकाण झालं आहे. तलावाच्या भरावावरूनच विजापूर महामार्ग जातो. तलावाच्या मधोमध रेल्वेमार्ग आहे. रेल्वेतून पाहताना तलावाचे सौंदर्य खुलते.१९३८ मध्ये चीनला भारतीय डॉक्टरांचे वैद्यकीय पथक पाठवले होते. चीनवर जपानने आक्रमण केले होते. युद्धातील जखमी सैनिकांवर उपचार करण्यासाठी डॉक्टर अपुरे पडत होते. अशासाठी भारताने मानवतेच्या भूमिकेतून पाच डॉक्टरांचे पथक १९३८ मध्ये तिकडे पाठविले. यात सोलापूरचे डॉ. द्वारकानाथ शांताराम कोटणीस उत्स्फूर्तपणे सामील झाले. चीनच्या युद्धभूमीवर जाऊन डॉ. कोटणीस यांनी हजारो जखमी सैनिकांचे प्राण वाचविले. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत औषधे व साधनांची कमतरता असताना त्यांनी सैनिकांची सेवा केली. ते तिथेच राहिले. वयाच्या ३२ व्या वर्षी त्यांचे चीनमध्येच निधन झाले. चीनची जनता आजही त्यांना देवदूत मानते. सोलापूरच्या भय्या चौकात डॉ. कोटणीस यांचे स्मारक आहे.
पूर्व भाग सार्वजनिक वाचनालय
तेलुगु भाषिक असूनही शहराच्या पूर्वभागातील तेलुगु भाषिकांनी मराठी साहित्याची सेवा सोडली नाही. कन्ना चौकातील मद्दा मंगल कार्यालयात पूर्वविभाग सार्वजनिक वाचनालय सुरू झाले. त्या काळी सोलापूर आणि यशवंत या सहकारी सूत गिरण्या अतिशय वैभवात होत्या. त्यांनी देणग्या दिल्यानंतर कन्ना चौकात रस्त्यालगत इमारत उभी केली. वाचनालय, ग्रंथालय आणि स्पर्धा परीक्षा केंद्र सुरू झालेमल्लिकार्जुन जैन मंदिर :-
सोलापूर हे पश्चिम महाराष्ट्रातील कर्नाटक सीमेलगतचे शहर म्हणून ओळखले जाते. जैन मुनी नेहमी पायी विहार करतात. ते दक्षिण भारताकडे निघाले की सोलापूरला अवश्य येत. त्यांच्यासोबत त्यांचे भक्तगण असत. त्यापैकी अनेक श्रावक गुजरात, कर्नाटक, मध्य. प्रदेश येथून येऊन सोलापुरात स्थायिक झाले. मूळचे सोलापुरातलेही अनेक जैन भक्त होतेच. त्या सर्वांनी आराधनेसाठी जैन मंदिरांची स्थापना केली.जैन समाजात मुख्यत: दिगंबर व श्वेतांबर असे दोन संप्रदाय आहेत. सोलापूर जिल्ह्यात शेकडो जैन मंदिरे आहेत. परंतु शहरात सामाजिक ट्रस्ट संचलित मुख्यत १३ जैन मंदिरे आहेत. त्यापैकी दहा दिगंबर जैन व तीन श्वेतांबर जैन मंदिरे आहेत. (हद्दवाढ भागातील कुमठे येथील चंद्रप्रभू दिगबंर जैन मंदिर आहे. सहाशे वर्षे प्राचीन मंदिराचा सध्या जीर्णोध्दार सुरूआहे.)
प्राचीन पार्श्वनाथ मंदिर -
सुमारे ८०० वर्षांपूर्वी तात्या गोपाळ शेटे परिवाराने लक्ष्मी मंडईजवळ अतिशयकारी भ. पार्श्वनाथ मंदिराची स्थापना केली. तीन फूट उंच पितळी मूलनायक मंदिराचे कार्य सध्या डॉ. रणजित गांधी व परिवार पाहात आहेत. त्यानंतर सन १८४९ साली हरिभाई देवकरण परिवारातील हरिचंद देवकरण व गांधी नथुराम देवकरण यांनी शुक्रवार पेठेतील आदिनाथ दि. जैन मंदिराची स्थापना केली सध्या सुनील गांधी हे अध्यक्ष आहेत. येथे चार फूट उंच काळ्या पाषाणातील मूर्तीसोबत अनेक प्राचीन मूर्र्तीही स्थापित झाल्या आहेत. या मंदिरालगतच हिराचंद गांधी स्थापित सुमारे ८० वर्षे प्राचीन रत्नत्रय दि. जैन मंदिर आहे. बाळीवेस चौकात असलेल्या जैन बोर्डिंग अंतर्गत महावीर दि. जैन मंदिर आहे. याची स्थापना १९३५ साली रावजी सखाराम दोशी परिवाराने केली. १८९४ साली दत्तात्रय अण्णा बुबणे परिवाराने चाटी गल्लीतील आदिनाथ दि. जैन मंदिराची स्थापना केली. १९६० साली सम्राट चौकातील श्राविका आश्रम येथे पद्मश्री सुमतीबाई शहा यांनी भ. महावीर कमळ मंदिराची स्थापना केली. २००२ मध्ये आचार्य देवनंदी महाराजांच्या प्रेरणेने विजापूर रोड येथे भगवान बाहुबली मंदिर, कोंडी येथे भ. आदिनाथ मंदिराची स्थापना झाली.
श्वेतांबर संप्रदायानेही भरपूर प्रगती केली. जुनी मिल कंपाउंड येथे १८९५ मध्ये शांतीनाथ श्वेतांबर जैन मंदिराची स्थापना झाली. रविशेखरजी महाराजांच्या प्रेरणेने या मंदिराचा जीर्णोध्दार होऊन प्राणप्रतिष्ठा होणार आहे. १९२० मध्ये पाबुदानजी निमाणी, रायचंदजी दोशी, चुनीलालजी शाह या धर्मप्रेमींनी प्राचीन भ. आदिश्वरांची मूर्ती आणून जोडभावी पेठ येथे भव्य मंदिराची स्थापना केली. १९९७ मध्ये सम्राट चौक येथे शंकेश्वर पार्श्वनाथ मंदिराची स्थापना झाली. या तिन्ही मंदिरांची ट्रस्ट एकच असून तिलोकचंदजी निमाणी अध्यक्ष आहेत. श्वेतांबर समाजाची ९ वैयक्तिक मंदिरे आहेत. भगवान आदिनाथांपासून भगवान महावीरांपर्यंत सर्व तीर्थकरांच्या मूर्ती शांततेची साक्ष देत आहेत.
सोलापुर महानगर पालिकेची इमारत :-
एकेकाळी महाराष्ट्रात चैथ्या क्रमांकावर आणि देशात बाराव्या क्रमांकावर असलेल्या सोलापूर शहराच्या सौंदर्यात भर घालणारी सोलापूर महानगरपालिकेची सर्वोत्कृष्ट सुबक नक्षीकाम असलेली अत्यंत रेखीव, मनमोहक, देखणी इमारत म्हणजे इंद्रभुवन होय. अनेक स्थापत्य शास्त्रांच्या प्रमाणबद्ध मिश्रणातून साकार झालेली सुमारे १५ हजारपेक्षा जास्त चैरस फुटांची ही भक्कम साजिरी इमारत शहराच्या मध्यवर्ती भागात उंचावर मोठया डौलाने उभी आहे. ही इंद्रभुवन इमारत स्थापत्य शास्त्राचा एक उत्कृष्ट नमुना मानला जातो. जगभरातील उत्कृष्ट इमारतींमध्ये त्याकाळी वापरण्यात आलेले अत्याधुनिक बांधकाम साहित्य या इमारतीत वापरण्यात आले आहे. राहण्यासाठी उभी केलेली ही प्रासादासारखी वास्तू बांधण्यासाठी १३ वर्षांचा कालावधी लागण्याचे मुख्य कारण म्हणजे ती सर्वांत्कृष्ट व्हावी हे होय. जगभरातील अनेक देशात आप्पासाहेब वारद यांनी दौरे करून या इमारतीसाठी लागणार्या सुबक आणि आकर्षक वस्तू आणल्या. ग्रॅनाईट, बेसाल्ट, शहाबादी दगडांपासून घडविलेल्या या वास्तूसाठी जगभरातील सर्वांत्कृष्ट स्थापत्य पद्धतीचा वापर करण्यात आला आहे. सोलापूरच्या सौंदर्यात भर टाकणारी सोलापूर इंद्रभवन इमारत ही कलाकुसरीचा उत्कृष्ट नमुना आहे. या इमारतीचे साधारण २५ हजार स्क्वेअर फूट जागेवर १८ हजार स्क्वेअर फुटाचे बांधकाम करण्यात आले आहे. यामध्ये चालुक्य काळातील भारतीय कलाकुसर तसेच विजयपूर येथील ऐतिहासिक वास्तूंचा प्रभाव आणि बरोक, रोकोको या युरोपियन शैलींचाही समावेश दिसून येतो.
देशातील अग्रगण्य बारा उद्योजकांमध्ये नाव असलेले व्यापारी सोलापूरात होऊन गेले ते म्हणजे पुण्यश्लोक मल्लप्पा ऊर्फ आप्पासाहेब वारद यांनी हा पराक्रम सोलापूर शहरात राहून करून दाखविला आहे. व्यापार, उद्योग, दानशुर वृत्ती आणि धार्मिक अधिष्ठानामुळे १८९० च्या दशकात सोलापूर शहराला ’वारदाचे सोलापूर’ म्हणून ओळखले जात होते. वारद घराण्याचे मूळ पुरूष गुरूबसप्पा हे निण्णी, जि. बिदर येथील रहिवासी होते. बीदर सोडून जवळच मंगळवारपेठ नावाच्या गावात ते काही दिवस राहावयास गेले. त्याना विरूपाक्ष नावाचा मुलगा होता. विरूपाक्ष यांना बसप्पा व मल्लिकार्जुनप्पा नावाची दोन मुले होते. यामधील आप्पासाहेब हे बसप्पांचे पुत्र होते.
१९ व्या शतकाच्या सुरुवातीला बसप्पा हे धाराशिव जिल्हयातील इटकळ येथे वास्तव्यास आले होते. ते पुढे व्यापाराच्या निमित्ताने सोलापूरमध्ये येऊन स्थायिक झाले. ते सोलापूर मध्ये मंगळवारपेठेतील वारद बोळात राहत होते.
अप्पासाहेब वारद
आप्पासाहेब वारद यांचा जन्म १७ जून १८५१ रोजी पहाटे झाला. त्यांच्या जन्मामुळे वडिलांना आणि चुलत्यांना खूप आनंद झाला. अन्नदान आणि वस्त्रदान करून बारसे साजरे करण्यात आले. आप्पासाहेबांचे मूळ नाव मल्लेश उर्फ मल्लप्पा असे ठेवण्यात आले होते. गोरा वर्ण, मोहक चेहरा, बाळसेदार शरीरयष्टी यामुळे मल्लेश हा सर्वांचा लाडका बनला. पुढे मल्लेश पंधरा वर्षांचा झाल्यावर चन्नबसप्पांनी त्याला आपल्या दुकानात बसण्यास सांगितले. चुललत्याच्या मार्गदर्षनाखाली तो उधारी बसुलीचे काम करू लागला. हळूहळू ओळखी वाढल्या, जनसंपर्क वाढले, व्यवहार ज्ञान वाढले. आप्पासाहेबांनी वडील बंधू चनबप्पा यांच्याबरोबर व्यापारात लक्ष घालण्यात सुरुवात केली. केवळ दोन पेढया असलेल्या वारद यांनी भारतभर 40हून अधिक पेढया उभ्या केल्या होत्या. त्यांच्या पेढयांमध्ये हिशोब लिहिण्यासाठी पद्धत ही त्याकाळी आदर्श ठरली. ब्रिटिश सरकारने सर्व मोठया उद्योगांना अशा पद्धतीने हिशोब लिहिण्याचा आदेश दिला.
इंद्रभुवनची निर्मिती
बांधकामाचे कोणतेही शास्त्रशुद्ध औपचारिक शिक्षण न घेतलेल्या शेकडो कारागिरींनी एक तपाहून अधिक काळ अखंड परिश्रम घेऊन केवळ दगड, चुना, विटांचा वापर करून शभर वर्षापूर्वी उभी केलेली ही टोलेजंग इमारत आजही तितकीच मजबूत आहे. ’पिलर’चा आधार न देता उभे केलेले मजबूत सभागृह त्यात आहेत. कोणतेही काम अत्यंत भव्य, सुंदर, भक्कम आणि व्यवस्थित असावे यावर, त्यांचा कटाक्ष होता. इंद्रभुवन प्रासाद बांधण्याची कल्पना त्यांच्या डोक्यात येताच संपूर्ण भारतातील अनेक इमारतीचे सुंदर सुंदर नमुने त्यात कसे समाविष्ट करता येतील इकडे त्यांचे लक्ष वेधले. या तीन मजली मजबूत इमारतीचे बांधकाम सुरू झाल्याबरोबर आप्पासाहेबांनी मुंबई, मद्रास आणि कलकत्ता येथे असलेल्या त्यावेळच्या ब्रिटिश इस्ट इंडिया कंपनीची कार्यालये, रेल्वे स्टेशन, फोर्ट आदी इमारती पाहिल्या. इंजिनियरशी चर्चा करून निरनिराळया भागांचा आराखडा त्यांनी करून घेतला. व्हिक्टोरियन स्थापत्य शास्त्राचा आदर्श नमुना म्हणून या इमारतीचा लौकिक सर्वत्र पसरला. इंद्रभुवनच्या बांधकामासाठी जिल्हयातील कलावंत आणि जिल्हयात तयार होणारा माल यांना त्यांनी प्राधान्य दिले. सन १८९९ साली या महालाचे बांधकाम सुरू झाले आणि सन १९१२ साली इमारतीचे बांधकाम पूर्ण झाले. सलग साडेबारा वर्षे हे बांधकाम चालू होते. ही इमारत आप्पासाहेब वारद यांनी आपल्या निवासासाठी बांधायला घेतली अशी चर्चा त्यावेळी होती. बंगल्याच्या सभोवताली असलेल्या एकूण नऊ एकर जमिनीवर एक उत्कृष्ट उद्यान असावे. बंगल्यातील सर्व सामानसुमान कलासुंदर असावे अशी त्यांची तीव्र मनीशा होती पण त्यांच्या हयातीत ही इमारत पूर्ण झालेले पहावयाचे भाग्य त्यांना लाभले नाही. १९११ साली इंद्रभुवनाचे शिल्पकार आप्पासाहेब वारद यांचा मृत्यु झाला.
सोलापूर महानगरपालिकेसाठी इंद्रभुवनचा वापर
इंद्रभुवनमध्ये काही दिवस हरिभाई देवकरण प्रशाला भरत असे. त्यानंतर जिल्हाधिकारी कार्यालय, त्यानंतर काही काळ जिल्हा सेशन कोर्टाचे कार्यालय या इमारतीत होत. आप्पासाहेब वारद यांच्या मृत्युनंतर काही दिवस ही इमारत वारद कुटुंबीयांच्या ताब्यात होती. नंतर ती शासनाने ताब्यात घेतली. दिनांक १ मे १९६४ रोजी महाराष्ट्र दिनी आणि कामगार दिनाचे औचित्य साधून सोलापूर महानगरपालिकेची स्थापना इंद्रभुवन येथे करण्यात आली. 1964 साली सोलापूर नगरपालिकेचे रूपांतर महापालिकेत झाल्यावर शासनाने नवीपेठेतील कार्यालय या इमारतीत हलविले. त्या दिवसापासून या इमारतीमध्ये महानगरपालिकेचे कामकाज आजतागायत सुरू आहे. अनेक स्थापत्यविशारदांनी गौरविलेल्या या इमारतीत पूर्वी शासकीय कार्यालयांचा कारभार चालत असे. यामध्ये मामलेदार कचेरी आणि न्यायालयाचाही समावेश होता. इमारतीचा गौरव म्हणून २००४ साली टपाल खात्याच्या वतीने या इमारतीचे चित्र असलेले टपाल तिकिट काढण्यात आले.
सोलापूर ते पंढरपूर, सोलापूर ते तुळजापूर सकाळी ६ ते रात्री ९. ३० पर्यंत दर अर्ध्यातासाला विनावाहक गाडी आहे.
अक्कलकोटला जायायला सकाळी ६ ते रात्री ८ पर्यंत दर १५ मिनिटाला गाडी आहे.
नळदुर्गला जायायला सकाळी ७. ३० ते संध्याकाळी १८. ३० पर्यंत दर तासाला गाडी आहे.
मुंबईला जायला वेळेत आणि नेमक्या एसटी आहेत.
पुण्याला जायला दर अर्धा ते पाऊण तासाला एक एसटी आहे. मात्र संध्यकाळी पाऊणे सहा नंतर तासाला एक गाडी आहे.
मंगळवेढा किल्ल्याला जायला सकाळी ६ ते संध्याकाळी ६ पर्यंत दर अर्ध्या तासाला एक गाडी आहे.
तसेच सांगोला- मंगळगड मार्गे गावी जाणारी एसटी हि असते.
संदर्भ :-
१६) माने राजा (संपा.), सबकुछ सोलापूर, लोकमत मीडिया प्रा. लि., सोलापूर,२०१४.
१७) बमणगांवकर ना.रा., पुण्यष्लोक वारद, वारद स्मारक मंडळ प्रकाशन, सोलापूर, १९४९.
१८) सोलापूर नगरपालिका: शतसांवत्सरिक ग्रंथ.
१९) पुण्यष्लोक वारद स्मारक समिती: अहवाल.
२०) https://mr.wikipedia.org/wiki/
२२) योजना मासिक डिसेंबर 2021 अंकातील प्रा. प्रभाकर कोळेकर, सोलापूर विद्यापीठ यांचा लेख
२३) थिंक महाराष्ट्रसाठी अनिरुद्ध बिडवे यांनी लिहिलेला लेख
२४) कर्तव्यसाधनासाठी रविंद्र मोकाशी यांनी लिहिलेला लेख
२५) www.trekshitiz.com हि वेबसाईट
२६) www.durgbharari.in हि वेबसाईट

The entry to the fort is from western side. The main gate of the fort lies on northern side but entry is not allowed from there. We bought the tickets and went inside through this small gate. Tickets were verified by the security guard before letting us in.
Just in the front, we saw two cannons placed. These belong to Britishers and we can see their mark engraved on it. A signboard depicts that there was a garden developed in the premises in the year 1989. I took right turn and started exploring the fort.

There is a bastion and stairs can be used to go on its top. We can clearly see double layered fortification. Beside this bastion, there are many locked rooms.

There is enough space on the fortification and we can even walk along this over the entire fort. It is little broken in between so be careful.
An old structure.
There is another bastion on this side which has a pole on the top for flag hoisting.
This bastion is the highest point on the fort. There are proper steps to go up. On one of the pillars, lion has been carved out. From here, we can see beautiful Shri Siddheshwar temple and the lake adjacent to it.
After getting down, we saw a small well with walls.

Moving ahead, we saw these sculptures of Elephant and Flowers in the wall.

There is a board ahead which shows the way to a temple and a well. But the path has been locked by a gate and we cannot go from this side of the fort.
If we climb up the nearby bastion, we can see it.
Going ahead, there is a Mosque. It has many columns inside.
All the columns have uniform carvings on them. The structure inside looks amazing.
Further on this way, there is a Shiva temple. It must have been built from a single rock but now it is in ruins and there is a iron fence on it. There are delicate and beautiful carvings made on the pillars.
There is a Shivaling below the cover.
Just left to this temple, there is a way which takes us to Mahakal Darwaja. There are two minarets on the top, two carved lions and empty space which could have housed inscription. The entry is within the arch.
Just beside the gate, there are temples of Lord Mahakaleshwar and Shanaishwar.
Beside the temple, we could see some ancient sculptures.
There is also an inscription on the rock in Modi script language.
There is second gate of the fort known as Khoti Darwaza, it has wooden door. On the top there are two lions, Persian inscription and two minarets on the top. Also there are some windows.
After this gate, there is a huge open area. There are some arch like structure with holes.
It could have been used to keep guns for the attack.
After this there is the main gate of the fort also called as Revani Darwaza. This is also a wooden door but fitted with iron plates and bolts on the outer side.
Adjacent to this huge door, there is a small door which must have been used for people movement.
After crossing main gate, we could see the well and rock made wall surrounding it. This is called as Nagmodi vihir. There is a small bridge over the water flowing down here.
A goddess sculpture on the outer wall of the fort.
Further ahead, there is a gate. Outside the gate, there are two vertical pillars which look very old. But this gate is closed.
This completed our exploration of the fort. There are four recent tanks built around the garden but its not maintained.
You can also watch the vlog here.
![]() |
| Wrestling arena near the Solapur Fort aka Bhuikot Fort walls |
After visiting Machnur Fort and SiddheshwarTemple in Machnur we traveled on the Sangola - Mangalwedha - Solapur Road to reach Solapur. It took us around an hour's time to reach. Distance is 45 KM away. The directions are tagged on Google maps.
![]() |
| Fortification of Solapur Fort aka Bhuikot Fort |
![]() |
| History of Solapur Fort aka Bhuikot Fort |
![]() |
| Bastion at Solapur Fort aka Bhuikot Fort |
![]() |
| Bastions at Solapur Fort aka Bhuikot Fort |
![]() |
| Fortification of Solapur Fort aka Bhuikot Fort |
![]() |
| Fortification of Solapur Fort aka Bhuikot Fort |
![]() |
| Fortification of Solapur Fort aka Bhuikot Fort |
![]() | ||
Fortification of Solapur Fort aka Bhuikot Fort
|
![]() |
| Structures on Solapur Fort aka Bhuikot Fort |
![]() |
| Siddheshwar Temple and Lake from Solapur Fort aka Bhuikot Fort |
![]() | ||
Mosque within Solapur Fort aka Bhuikot Fort
|
![]() |
| Another Darwaza to enter Solapur Fort aka Bhuikot Fort |
![]() |
| Cannon within Solapur Fort aka Bhuikot Fort |
सोलापूरचा इतिहास
सोलापूरचा इतिहास
सोलापूर जिल्ह्यातील शिवकालीन जाज्वल्य इतिहास प्रकाशझोतात
माढा (जि. सोलापूर)
: दुसऱ्या सुरत मोहिमेला जाण्याअगोदर स्वराज्याच्या पुणे-नगर सीमेवरील
गावांतून रयतेला त्रास देणाऱ्या व स्वराज्यात येऊ पाहणाऱ्या मुगलांना
सीमेबाहेर थोपवण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांनी जुन्नर, कडा, अष्टी,
श्रीगोंदा, माढा, बार्शी, परांडा इत्यादी तत्कालीन नगर जिल्ह्यात
निजामशाहीत व मुघलशाहीत मोडणाऱ्या सीनाकाठच्या भागातील गावांत येऊन मुगल
अधिकाऱ्यांना सीमापार लावले. नगर, परंडा भागातील औरंगजेबाच्या आखत्यारीतील
51 गावांतील शत्रूंना पराभूत केल्याचा उल्लेख औरंगजेबाच्या दरबारी
कारकुनाच्या नोंदवहीत असल्याने छत्रपती शिवाजी महाराज या भागात शके 1592
वैशाख वद्य चतुर्दशी अर्थात 8 मे 1670 मधे येऊन गेल्याने हा भाग छत्रपती
शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झाल्याच्या घटनेला या वर्षी 350
वर्षे पूर्ण झाली आहेत. एका कतब्यानुसार मंगळवेढा, पंढरपूर, तुळजापूर भागात
महाराजांनी मोहीम केल्याचा दावा इतिहास संशोधक मयूर चव्हाण यांनी केला
आहे. तब्बल 350 वर्षांपूर्वीचा सोलापूर जिल्ह्यातील विविध गावांचा शिवकालीन
जाज्वल्य इतिहास प्रकाशझोतात आणला आहे.
याबाबत इतिहास संशोधक मयूर चव्हाण यांनी सांगितले की पुरंदरच्या तहात
गेलेली संपत्ती व किल्ले परत मिळवण्यासाठी आखलेल्या दुसऱ्या सुरत मोहिमेवर
जाण्याअगोदर छत्रपती शिवाजी महाराजांनी मुगलांना नियंत्रणात आणण्यासाठी जी
योजना आखली त्यात माढा, बार्शी, परांडा हा नगर निजामशाहीत व मुघलशाहीत
मोडणारा सीना व भीमाकाठचा सधन बागायत भागही समाविष्ट होता. हा भाग परांडा
किल्ल्याच्या नियंत्रणात होता. माढा तालुक्याचे शिवकालीन नाव "माढे, माढं'
असून या तालुक्यांवर शिवपूर्व बहामनी काळापासून कायमच सुलतानी सत्तेचे
राज्य होते. सीना व भीमा नदीकाठ हा मुख्य खंडणीमुलूख होता. औरंगजेबाने या
भागावर इ. स. 1657 मध्ये नासीरखान, इ. स. 1662 मधे सय्यद महमद खान यांना
नेमून "जुन्नर, पांडे, श्रीगोंदा, अष्टी, कडा व परिंडा खालील मुलूख
सांभाळून संधी मिळताच सीमा ओलांडून मराठ्यांचा मुलूख बेचीराख करून खेडी ओस
करावी असा उल्लेख असलेले औरंगजेबाची हुकूमपत्रे उपलब्ध आहेत. यासाठी
औरंगजेबाने दीड हजार जाठ, दीड हजार पायदळ, 20 तोफा, 500 बंदूकधारी सैन्य व
अन्य सरदार, शिपाई परांडा किल्ल्यावर तैनात केले होते. हेच सैन्य परांडा,
माढा आदी भागातून सीमा ओलांडून स्वराज्याच्या सीमेवरील नागरिकांना व
गावांना त्रास देत असल्याच्या वार्ता छत्रपती शिवाजी महाराजांच्या कानी
गेल्यानंतर मुघलांचा बंदोबस्त करण्यासाठीच महाराजांनी दुसरऱ्यांदा सुरत
मोहिमेवर जाण्यापूर्वी मुगलांना सीमेबाहेर काढण्यासाठी अगोदर जुन्नर येथील
कारतलब खानाला झोडपले व नगर येथील परांडा परगण्यातून, माढ्यातून व
आसपासच्या क्षेत्रातून स्वराज्याच्या सरहद्दीत घुसखोरी करणारे अब्दुल
मुनीम, नासीर खान, राव करणसिंह, सर्जाखान या मुगल अधिकाऱ्यांना महाराजांनी
चांगलेच झोडपून काढल्याचा उल्लेख मुगल दरबारच्या एका फारसीतील तवारीखेच्या
नोंदवहीत आहे. शके 1592 वैशाख वद्य चतुर्दशी (इ. स. 8 मे 1670) जुन्नर,
नगर, परिंडा महालातील 51 गावांत छत्रपती शिवाजी महाराजांनी मुघलांना शिकस्त
दिल्याचा उल्लेख आहे. या नामावलीत "परांडे' महालातील मौजे "बार्सी' व मौजे
"माढे' असा उल्लेख असून हा मूळ मजकूर औरंगजेबाच्या दरबारी कारकुनाच्या
नोंदवहीत आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी या हल्ल्यातून मुगल सैन्याला
शिकस्त दिली व माढा, बार्शीसह आसपासच्या 50-52 गावांतील रयतेचेही रक्षण
केले. माढा तालुक्यात घडलेल्या या ऐतिहासिक घटनेला 8 मे 2020 रोजी ठीक 350
वर्षे पूर्ण झाली आहेत.
मोहिमेत महाराजांसह स्वराज्याचे महापराक्रमी सेनानी व शिवरायांचे व्याही सेनापती कुडतोजी ऊर्फ प्रतापरावजी गुजर व अन्य मुत्सद्दी आनंदरावजी, निळोपंत आदी मराठेशाहीतील मातब्बर मंडळी उपस्थित होती. जून 1670 मधील एका कतब्यानुसार महाराजांनी मंगळवेढा, पंढरपूर, तुळजापूर आदी भागासह बादशाही व निजामशहीच्या मुख्य इलाख्यात मोहीम केली व पुढे जुलै 1670ला या भागातून परत जाऊन 2 ऑक्टोबर 1670 मधे कल्याण-भिवंडी-नाशिक खानदेश मार्गे सुरतेत गेले व सुरत मोहिमेनंतर आल्यामार्गे किल्ले रायगडावर परतले. या ऐतिहासिक घटनेत शिवछत्रपतींची पाऊले सोलापूर जिल्ह्यात विविध ठिकाणी तथा माढा तालुक्यात उमटल्याने या भागाचे शिवकाळातील ऐतिहासिक महत्त्व उजेडात येत असून समस्त जिल्ह्याने या घटनेतून प्रेरणा घेऊन हा वारसा जपण्याची गरज आहे, असे श्री. चव्हाण यांनी सांगितले.
असे केले संशोधन
या ऐतिहासिक घटनेच्या संशोधनासाठी शिवकालीन इंग्रजांचे मुंबई व ठाणे
दफ्तरातील फॅक्टरी रेकॉर्डस व इंग्रजांचे सुरत कन्सलटेशनचे पत्रव्यवहार,
शिवकालीन बखरी व पत्रसंग्रह, मुगलांच्या अस्सल तवारिखा, औरंगजेबाची विविध
फरमाने, मनसबदारी कागदपत्रे, हूकूमपत्रे अशा मोडीलीपी, मराठी, इंग्रजी व
फारसी भाषांतील अस्सल साधने एकत्रित करून श्री. चव्हाण यांनी या घटनेचे
संशोधन केलेले आहे.
सोलापूर शहर परिवहन कार्यशाळेसमोरच्या बुधवार पेठेतील नवनिर्मित बौद्ध विहाराजवळ काही वर्षांपूर्वी शिलालेख सापडला. तो सर्वज्ञ चक्रवर्ती चालुक्य सोमेश्वर तिसरा (इसवी सन 1127-1168) याच्या कारकिर्दीतील आहे. अभिलाषितार्थ चिंतामणी अथवा ‘मानसील्लस’ या ग्रंथांचा कर्ता तोच. महामंडलेश्वर कलचुरी बिज्जलदेव दुसरा (इसवी सन 1130-1168) याची सत्ता त्या विभागावर होती. त्याची राजधानी मंगळवेढ्यास होती. वीरशैव मतोद्धारक बसवेश्वर हे त्याच्या दरबारात मंत्री होते. पुढे बिज्जलदेवाने चालुक्यांची सत्ता अपहरण करून तो स्वत: सत्ताधीश झाला व त्याने त्याची राजधानी बीदर जिल्ह्यातील कल्याण येथे हलवली. बिज्जलदेवाचा स्थानिक अधिकारी महाप्रधान श्रीकरण कन्नप्पय्य नायक यांनी त्या ठिकाणी एक त्रिकारात्मक मंदिर निर्माण केले. त्या त्रिकुटातील स्थापित देवतांची नावे अनुक्रमे कन्नेश्वर, चट्टेश्वर आणि मल्लिकार्जुन. त्या मंदिरांना बिज्जलदेवांनी भूदान दिले आहे. त्या सर्व नोंदी शिलालेखामध्ये नोंदवताना ते मंदिर सोन्नलिंगे (सोलापूर) येथे उभारण्यात आल्याचे म्हटले आहे. त्या लेखाची तारीख आहे 22 डिसेंबर 1135. सोलापूर अस्तित्वात असल्याचा स्पष्ट असा तो पहिला पुरावा होय. त्याचा अर्थ असा नव्हे, की ते गाव त्या काळापूर्वी अस्तित्वातच नव्हते! त्याचे अस्तित्व जरूर असणार; परंतु त्याचा इतिहास मागे किती न्यायचा याचा विचार अनेक अंगांनी करावा लागेल. तत्कालीन ते स्थान व्यापारपेठ अथवा राजकीयदृष्ट्या महत्त्वाचे होते, अशा नोंदी पुराभिलेखांतून व तत्कालीन ग्रंथातून मिळत नाहीत. तसे जर असते तर बलचुरी बिज्जलदेव किंवा त्या राजघराण्यातील पूर्ववर्ती सत्ताधिकारी यांनी त्यांची राजधानी मंगळवेढ्यास न ठेवता तो मान सोलापुरास दिला असता. परंतु शिवयोगी सिद्धरामांच्या श्रीशैल यात्रेनंतर, त्यांनी सोलापूर येथे निर्माण केलेल्या कपिलसिद्ध मल्लिकार्जुन मंदिराच्या प्रसिद्धीमुळे सोलापूर प्रकाशझोतात आले. यथाकाल, सिद्धरामांनी तलावनिर्मिती करून त्या गावाचा पाणीप्रश्न सोडवला. त्यापुढे सोलापूरच्या प्रगतीत कोठे अडसर आल्याचे दिसून येत नाही.
इसवी सन 1135 च्या शिलालेखात उल्लेखलेले त्रिकटात्मक मंदिर अस्तित्वात नाही. ते कोठे होते, कसे होते याबद्दल काही माहिती नाही. ते काळाच्या उदरात नामशेष राहिले आहे.
सिद्धरामनिर्मित कपिलसिद्ध मल्लिक्कार्जुनाचे मंदिर (इसवी सन 1130-1180) अवशेष स्वरूपात किल्ल्यामध्ये उभे आहे. किल्ल्याची निर्मिती ही नंतरची आहे. कल्याण चालुक्याची उत्तम मंदिर निर्मिती म्हणून त्या वास्तूकडे बघण्यास हरकत नाही. हंपी (विजयनगर) चे कवी राघवांक (सुमारे इसवी सन 13 वे शतक) यांनी सिद्धराम पुराणांची पद्यात्मक रचना केली आहे. त्या कृतीचे मूळ नाव ‘सिद्धराम चरित्र’. तो ग्रंथ लिहिताना राघवाकांनी कपिलसिद्ध मल्लिकार्जुन मंदिराचे वर्णन करताना त्या परिसरातील इतर मंदिरांचेही वर्णन केले आहे. परंतु त्यातील एकही शिल्लक नाही!
पुढील काळात अनेक राजकीय स्थित्यंतरे झाली. पारतंत्र्याच्या काळात व त्या आधीच्या मुसलमानी कारकिर्दीत, असहिष्णू मताच्या मंडळींनी कपिलसिद्ध मल्लिकार्जुन मंदिराची जेवढी विटंबना व नासधूस करता येईल तेवढी केली. कालांतराने, भक्त मंडळींना पूजा-उत्सवादी करणे कठीण झाले. त्यामुळे स्थानिक सद्भक्त मंडळींनी निर्णय घेऊन जुन्या मंदिरातील काही खांब आणि उपयुक्त शिलासामुग्री एकत्र करून उत्तर कसबा येथील मल्लिकार्जुन मंदिर निर्माण केले. तो सन आहे इसवी सन 1821. कपिलसिद्ध मल्लिकार्जुन म्हणजे सोन्नलिगे पुखराधिश्वर; अर्थात सोलापूरचे ग्रामदैवत होय.
मध्ययुगीन मुस्लिम राजवटीत बहामनीकडून तेथे भुईकोट उभारला गेला. त्याच्या बांधकामात हिंदुमंदिराचे ताशीव दगड, मूर्तिशिल्प, अनेक कोरीव स्तंभ वापरण्यात आले आहेत. त्याचा अर्थ उघड आहे, की परिसरातील हिंदुमंदिरे उध्वस्त करून, मोडतोड करून त्यांची शिळासामग्री किल्ला बांधताना वापरली गेली आहे. कालांतराने, तो किल्ला बहामनीकडून विजापूरच्या आदिलशहाने वीस मण सोने देऊन विकत घेतला अशी नोंद इतिहासातून मिळते.
बहामनी व आदिलशाही काळात तेथे अनेक मशिदी, दर्गे व विहिरी यांची निर्मिती झाली. तथापी, कालौघात त्यातील ब-याच वास्तू नष्ट झाल्या व ज्या शिल्लक आहेत त्यात परिवर्तन झाले असल्याचे आढळून येते. त्या दोन्ही शाह्यांकडे सेवा रुजू केलेला एक अधिकारी नायब जाबित खान म्हणून होता. त्याने त्या शाह्यांसाठी बरीच खटपट करून पुष्कळ इमारतींची, वास्तूंची निर्मिती केली. अली आदिलशाह (इसवी सन 1657-1672) करता त्याने किल्ल्यामध्ये महाल उभारल्याची नोंद शिलालेखामध्ये सापडते. त्या सर्व वास्तू कालपुरुषाने स्वाहा केल्या आहेत. कालाय तस्मै नम:, दुसरे काय!
देशात पुराणवस्तू विभाग आहे. तो त्याच्या परीने कार्यरत आहे. खंडप्राय देशात पुराणवस्तू-वास्तूंचा फार मोठा पसारा आहे. त्या सर्वांचे कमी-अधिक महत्त्व देऊन संरक्षण, संवर्धन करणे मोठे कठीण काम आहे. स्थानिक पुराणवस्तुप्रेमी संस्थांनी या वास्तूंचे जतन करावयास हवे!
– आनंद कुंभार
प्लॉट क्र. 34, न्यू पातशा पेठ,
अशोक चौक, दिवटे टेक्स्टाईल्सच्याशेजारी,
सोलापूर – 413006
9420806485
(‘समर्थ सोलापूर, 2020’ मधून उद्धृत)
सोलापूर शहरातील वास्तू आणि वैशिष्ट्ये
सोलापूर कर्नाटकच्या सीमेवर वसले आहे. सोलापुरात बहुभाषिक नागरिक आहेत. त्यास हजार वर्षांचा इतिहास
आहे. ते पूर्वी सोन्नलगी या नावाने प्रसिद्ध होते. बाराव्या शतकात
श्रीशिवयोगी सिद्धरामेश्वर यांनी या नगराची रचना केली. त्यांनी तेथे
अडुसष्ट शिवलिंगांची स्थापना
केली. छत्तीस एकर क्षेत्रफळ असलेले सरोवर निर्माण केले. त्यालाच
सिद्धेश्वर तलाव असे म्हणतात. सिद्धरामेश्वरांनी समाजसुधारणेची लोकोपयोगी
कामे केली.
सोलापूर हे कापडगिरण्यांचे शहर म्हणून प्रसिद्ध होते. कापड उत्पादनास तेथे 1877 साली प्रारंभ झाला. ‘सोलापूर स्पिनिंग अँड विव्हिंग मिल’ ही पहिली गिरणी. ती ‘जुनी मिल’ म्हणून प्रसिद्ध होती. त्या मिलमध्ये तेलगू भाषिक समाज त्यांच्या वस्त्र विणण्याच्या कौशल्याबद्दल नावाजला गेला. ‘जुनी मिल’ हे सोलापूरचे वैभव मानले जाई.
शेठ गोकुळदास मोरारजी हे तिचे मालक! त्यांनी त्या काळी वीजनिर्मितीसाठी मिलच्या आवारात मोठे हौद व विहिरी खोदून पॉवर हाऊसही बांधले. पूर्ण सोलापूरचे रस्ते त्या वीजेमुळे प्रकाशित झाले. मिल अठ्ठ्याऐंशी एकर क्षेत्रात वसली आहे. मिलची चिमणी तीनशेपंचवीस फूट उंच होती व ती आशिया खंडातील सर्वांत उंच चिमणी ठरली. दुस-या महायुद्धात सैनिकांच्या छावणीसाठी लागणारे तंबूचे कापड त्या मिलमधून तयार होत असे. नंतरच्या काळात सोलापुरात अनेक गिरण्या उभारल्या गेल्या.
‘नरसिंग गिरजी’ ही मिल मिळालेला नफा कामगारांना वाटत असे! त्या मिलच्या आवारात अडीचशे वर्षांहून अधिक जुने वडाचे झाड आहे, त्याचा बुंधा तब्बल पंधरा फूट रुंद आहे. त्याच आवारात पाउणशे वर्षांपूर्वीचे लाकडी देवघर आहे. त्यातील गणपतीची मूर्ती साडेसहा फूट उंच आहे. देवघराचे नक्षीकाम रेखीव आहे. एकशेपंधरा वर्षांनंतरही पाणी पुरवणारी चौकोनी दगडी विहीरही तेथेच आहे.
सोलापुरातील चाळी प्रसिद्ध आहेत. वीरचंदपूर चाळ 1944 साली उभारली. तेथे चारशेअठ्ठ्याऐंशी घरे आहेत, तर एस.जी. वारद चाळीत तीनशेएक घरे आहेत.
कवी कुंजविहारी ऊर्फ हरिहर गुरुनाथ सलगरकर हे ‘लक्ष्मीविष्णू मिलमध्ये (1896 ते 1978)’ काम करत. लक्ष्मी विष्णू चाळीत घरे होती सातशेपन्नास. माधवराव आपटे यांनी ती मिल चालवायला 1966 मध्ये घेतली. त्या काळी चाळीचे भाडे तीन रुपये महिना असे (तेव्हा पाव दहा पैशांला व बुंदी पंधरा पैशांला मिळे). चाळींची डागडुजी चाळींचे मालकच करत.
शहराला हिप्परगा तलावातून पाणीपुरवठा होई. म्हणून अनेक विहिरी खोदल्या गेल्या. त्यांपैकी साखरपेठमधील विहिरीला गोड पाणी लागले. म्हणून त्या पेठेला साखरपेठ म्हणत. तेथेच सिद्धेरामेश्वरांच्या जन्माचा उल्लेख आहे. तेथेच हिंगलाजमाता मंदिर आहे. तिचे उगमस्थान बलुचिस्तानात असल्याचे दाखले मिळतात. त्याच भागात लाकडाचा बाजार होता. त्याला तेलगुमध्ये ‘कट्टेलसंता’ म्हणतात. त्या नावाचे प्रसृतिगृह त्र्याऐंशी वर्षांनंतरही कार्यरत आहे. त्याच पेठेतील पद्मा टॉकीज 1946 पासून टिकून आहे.
त्या पेठेतील सोमा कुटुंबीय हातमागावर सुंदर व सुबक कलाकृती विणतात व त्यांनी बनवलेल्या वॉलहँगिंगना जगभरात मागणी आहे. ते कुटुंब 1965 पासून वॉलहँगिंगच्या व्यवसायात आहे. साखरपेठेत राहणारे आणखी एक नाव आहे व्यंकटेश कोटा! भुयारी गटारे व ड्रेनेज साफ करणारी ‘व्यंकटगिरी यंत्रे’ बनवणारे व्यंकटेश कोटा फक्त पाचवीपर्यंत शिकलेले आहेत. पण त्यांच्या यंत्रांना अमेरिका, इंग्लंड व युरोपमध्ये मागणी आहे. त्यांनी त्यांच्या वयाच्या पंधराव्या वर्षी ते यंत्र बनवले. त्यांचा कारखाना सोलापूर-मंगळवेढा रस्त्यावर देगाव येथे आहे.
तुकाराम महाराज जोशी यांना वैष्णव संप्रदायाचे कुलगुरू मानतात. त्यांचा जन्म1910 सालचा. त्यांनी पंढरपूरला दिंडी नेण्याची सुरुवात सत्तर वर्षांपूर्वी केली. ती प्रथा अजूनही सुरू आहे. त्यांनी 1जानेवारी 1995 रोजी रविवार पेठेत जिवंत समाधी घेतली. त्यांचा समाधी सोहळा मोठ्या प्रमाणावर साजरा होतो. पद्मशाली समाज म्हणजे विणकर व विड्या वळणारे! तो समाज 1845 मध्ये सोलापुरात आला.
त्या समाजाच्या ‘सेवा मंडळा’ला एकशेचार वर्षे झाली. ती संस्था वड्डेपल्ली येथे आहे. त्याच पद्मशालींच्या 1943 मध्ये स्थापन झालेल्या कुचन प्रशालेच्या बावीस संस्था शिक्षणक्षेत्रात मोलाची कामगिरी बजावत आहेत. ‘दयानंद अँग्लो वैदिक शिक्षण’ संस्थेची स्थापना 1940 साली आर्य समाजाच्या (1886 साली लाहोरमध्ये आर्य समाजाची स्थापना झाली) मंडळींनी केली. देशभरात त्या संस्थेच्या सातशेपन्नास शाखा असून महाराष्ट्रात एकोणीस आहेत. माजी पंतप्रधान मनमोहनसिंग व माजी गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे हे ‘दयानंदचे’च (अनुक्रमे लाहोर व सोलापूर) विद्यार्थी. सोलापुरातील रविवार पेठेत त्रेसष्ट एकर जागेत उभे असलेले ‘दयानंद महाविद्यालय’ होतकरू विद्यार्थ्यांसाठी शिक्षणाची पंढरीच आहे. ते गेली त्र्याहत्तर वर्षे कार्यरत आहे. दयानंदचे विद्यार्थी – अटलबिहारी वाजपेयी, शहीद भगतसिंग, राजगुरू, लालकृष्ण अडवाणी, सुषमा स्वराज, क्रिकेटपटू कपिलदेव व महेंद्रसिंग धोनी, शाहरुख खान, गायक जगजितसिंग, डॉ. यु.म. पठाण, जब्बार पटेल, डॉ. अरुण टिकेकर, मारुती चित्तमपल्ली व अनेक आयएएस अधिकारी व आंतरराष्ट्रीय खेळाडू. तेथे माजी राष्ट्रपती डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन, विंदा करंदीकर, वसंत कानेटकर, महाकवी द.रा. बेंद्रे इत्यादी प्राध्यापकांनी विद्यार्थ्यांना शिकवले आहे.
सोलापूर महामार्गावरील मुळेगाव येथे 1933 साली विभागीय कृषी संशोधन केंद्राचे कार्य सुरू झाले. तेथे संशोधलेले विविध प्रयोग कोरडवाहू शेतीसाठी वरदान ठरले आहेत. तसेच, तेथे संशोधित झालेली नाना प्रकारची अवजारे व यंत्रे यांना राज्यभर ख्याती आहे. तेथे शास्त्रज्ञ एस.व्ही. कानिटकर यांच्या नावाने संग्रहालय उभारले गेले आहे.
सोलापुरात सुमारे पन्नास हजार हातमाग 1948 साली होते. त्या कुटिरोद्योगात मिळालेला नफा व्यापारी व दलाल यांनाच मिळायचा म्हणून 1949 साली तेथील रविवारपेठेत ‘उद्योग बँक’ उभारली गेली. ती 2004 सालापर्यंत कार्यरत होती व नंतर बंद पडली. त्या बँकेने 1966 साली व्याख्यानमाला सुरू केली. त्या व्याख्यानमालेचा नावलौकिक पुण्याच्या वसंत व्याख्यानमालेनंतर आहे. ती तेलगू भाषिकांकडून झालेली मराठीची सेवा आहे.
वडार समाज – ओरिसा प्रांतातून आलेला वडार समाज पूर्वी बांधकामावर दगड फोडण्याचे काम करत असे. त्यांची रविवार पेठेत तीन हजारांची वस्ती आहे. त्यांनी पारंपरिक व्यवसायाबरोबर सोलापूरच्या कला, क्रीडा, सांस्कृतिक व सामाजिक क्षेत्रांत मोठ्या प्रमाणावर योगदान दिले आहे. त्यांनी त्यांचा जम अनेक मंदिरे, कळसांची कलाकुसर व रंगरंगोटीतही बसवला आहे. सामुदायिक विवाह हे त्यांचे वैशिष्ट्य आहे. त्यांच्यामधील सुशिक्षितांचे प्रमाणही वाढत आहे.
सोळा गावांचे मिळून सोलापूर झाल्याचे सांगितले जाते. शहराच्या प्रत्येक भागाने त्याचे वैशिष्ट्य जपले आहे. आता जो संयुक्त चौक आहे, त्याला पूर्वी बारा तोटी चौक म्हणत. त्या बाजूला बारा तोटी नळ होते व चार बाजूंला चार पेठा होत्या. तेथेच तिप्पण्णा हिब्बारे यांनी पिठाची गिरणी शंभर वर्षांपूर्वी सुरू केली. ती चालू आहे. तर 1824 साली स्थापन झालेले ‘करंजकर विद्यालय’ही पावणेदोनशे वर्षांनंतर सुरू आहे. तेथे पहिली ते सातवीपर्यंत वर्ग असून सातशेदहा विद्यार्थी आहेत. त्या विद्यालयात सतराव्या शतकापासूनची दुर्मीळ ग्रंथसंपदा – नकाशे, शब्दकोश, जुन्या कादंबऱ्या व पुस्तके – आहे.
चाटी गल्ली व फलटण गल्ली या परिसरात कापड व्यापार आहे (मंगळवार पेठ). तेथील लक्ष्मीनारायण मंदिरात एका वर्षातील दोनशे दिवस विविध उत्सव सुरू असतात. जवळच, सत्यनारायण मंदिर आहे. (ते दोनशे वर्षांपूर्वीचे, महाराष्ट्रातील सत्यनारायणाचे दुसरे मंदिर). उत्तम वास्तुकलेचे नमुने असलेले अनेक जुने वाडे मंगळवार पेठेत पाहायला मिळतात. शिसवी लाकडात केलेली नक्षी असलेला काडादी वाडा, सत्तावीसशे फुटांचा तीन मजली येरटे वाडा, दीडशे वर्षांचा सोमशेट्टी वाडा, अब्दुलपुरकर वाडा… राठी, बसवंती, सोमाणी यांचे वाडेही जुने आहेत.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या अस्थी ठेवलेली ‘प्रेरणा भूमी, बुद्धविहार’ बुधवार पेठेत आहे. शंभर वर्षांची श्राविका संस्था; तसेच, दमाणी प्रशाला, जैन गुरुकुल संकूल, सोलापूर एज्युकेशन सोसायटी अशा नामवंत शिक्षण संस्था बुधवार पेठेतच आहेत. त्याच पेठेत श्रमिकांना रोजीरोटी देणारे विडी उद्योग आहेत.
लोकमान्य टिळकांना सार्वजनिक गणेशोत्सवाची संकल्पना ज्या ‘आजोबा गणपती’वरून सुचली ते मंदिर शुक्रवार पेठेत आहे. तेथे सार्वजनिक गणेशोत्सव इसवी सन 1885 पासून साजरा होतो. टिळक यांनी पुण्यातील सार्वजनिक गणपती 1893 मध्ये सुरू केला, त्याआधी आठ वर्षे! तो गणपती इको फ्रेंडली साहित्य वापरून बनवला गेला आहे व ती मूर्ती एकशेअठ्ठावीस वर्षांची जुनी आहे याचे आश्चर्य वाटते. अनेक मान्यवरांनी त्या मंदिरास भेट दिली असून तो मानाचा गणपती आहे. त्याच पेठेत गेली शंभर वर्षे दूध बाजार चालतो. ‘सोलापूर समाचार’ हे साप्ताहिक 1885 साली त्याच भागात सुरू झाले व त्याचे दैनिकात रूपांतर 1930 मध्ये झाले, पण ते 1988 साली बंद पडले. त्याच जक्कल कुटुंबीयांचे ‘विश्व समाचार (1976)’ मात्र सुरू आहे. त्याच भागात शंभर वर्षांपासून ‘भांडे’ गल्ली आहे. सर्व धातूंची भांडी, पलंग, कपाटे, ट्रंका तेथे मिळतात.
वड, लिंब व पिंपळ या वृक्षांचा संगम असलेले शहरातील एकमेव ठिकाण शनिवार पेठेत विठ्ठल-रुक्मिणी मंदिरात पाहण्यास मिळते.
भवानी पेठेतील कृषी विद्यालयात आधुनिक शेतीचे शिक्षण मिळते. त्याचे क्षेत्र साडेअकरा एकर आहे. ते विद्यालय गेली सहासष्ट वर्षे सोलापूरला वरदान ठरले आहे.
सोलापूरकरांचे आणखी एक आराध्य दैवत असलेली रूपाभवानी, तिचे मंदिरही भवानी पेठेत आहे. ती मूर्ती तुळजापूरच्या तुळजाभवानीशी मिळतीजुळती असल्याने ती रुपाभवानी! नवरात्रात तेथे मोठ्या प्रमाणात उत्सव साजरा होतो. दीड एकर जागेत सभामंडप व मंदिर परिसर सुशोभित करण्यात आला आहे. शहरातील जोडभावी पेठेत सर्व काही मिळते. मंगळवार बाजारात भाजीपाला, फळे, दूध, तूप, इतर खाद्यपदार्थ, कपडे, अवजारे, इलेक्ट्रॉनिक्स वस्तू, धान्य हे सर्व वाजवी भावात मिळते.
हातमागावर साड्या विणणारी पेठ म्हणजे आंध्र-भद्रावती/दाजी पेठ. तेथे तेलगू समाज इरकली, जपानी, मोठी किनार, श्यामसुंदर किनार अशा नावाने प्रसिद्ध असलेल्या साड्या विणत असे. आता आंध्र-भद्रावती पेठ ही यल्लमा पेठ म्हणून ओळखली जाते. दाजी पेठेत दाक्षिणात्य पद्धतीचे सुंदर व्यंकटेश्वर मंदिर, म्हणजे तिरुपती बालाजीची प्रतिकृती आहे. जवळ, तितकेच सुंदर राममंदिर आहे. पाच्छा पेठेतही दाक्षिणात्य बांधकामाचा उत्कृष्ट नमुना असलेले कालिकादेवी मंदिर आहे. त्याच पेठेत नऊवारी लुगडी व सतरंज्या बनवणारे हातमाग होते.
बेगम पेठ – सोलापुरवर औरंगजेबाचे वर्चस्व असताना तो ब्रम्हपुरी (ता. मंगळवेढा) येथे सात वर्षे राहिला. तो जुम्मा आणि ईद नमाजासाठी सोलापूरच्या जामे मशिदीत जात असे. तो खुद्द सोलापुरातही तेरा महिने राहिला होता. त्याची फौज बेगमपेठेत असायची. त्याच्याबरोबर त्याची चौथी पत्नी (बेगम) उदयपुरी व मुलगी झीनतल्लीसा होती. त्या वेळपासूनचे बेगमपुरा नंतर बेगम पेठ झाले आहे. ती व्यापा-यांची व कष्टक-यांची पेठ म्हणून प्रसिद्ध आहे.
सोलापूरच्या सिद्धेश्वर पेठेतील सिद्धेश्वर मंदिर, मार्कंडेय मंदिरही प्रसिद्ध आहेत. त्या पेठेत अनेक कलावंत झाले. नाट्य-कलागुणांची जणू तेथे मांदियाळी होती.
दीडशे वर्षे कार्यरत असलेले ‘हिराचंद नेमचंद वाचनालय’ हे सोलापूरची शान आहे. शहरवासीयांची बौद्धिक भूक भागवण्याचे काम ते वाचनालय करते. त्याचे तीन हजार सभासद आहेत. ते वाचनालय मुरारजी पेठेत आहे. वाचनसंस्कृतीबरोबर अनेक कार्यक्रमही त्यांच्या ‘टिळक स्मारक सभागृहा’त होत असतात. त्याच पेठेत राघवेंद्र स्वामी मठ आहे व तेथे हजारो भक्तगण अध्यात्माची परंपरा जोपासत आहेत.
साठ फुट खोल व तीस फुटापर्यंत पाय-या असलेली, संपूर्ण दगडी बांधकाम असलेली गंगा विहीर ही नवी पेठचे वैशिष्ट्य आहे. त्याच नवी पेठचे अजून एक वैशिष्ट्य म्हणजे ‘नामदेव चिवडा’! तो त्याची ओळख गेली एकशेचाळीस वर्षे टिकवून आहे. त्याच पेठेत छत्रपतींच्या कार्याची ओळख सांगणारे ‘शिवस्मारक’ एक एकर चौदा गुंठे जागेवर उभे राहिले आहे. राष्ट्रसेवेची प्रेरणा देणा-या त्या कार्यकेंद्रात विविध व्याख्याने, प्रवचने, स्पर्धा होत असतात. एक संग्रहालयही तेथे आहे. तसेच व्यायामशाळा, भौतिक चिकित्सा केंद्र आहे.
गावठाण भाग विकसित करून बनवलेली ती ही नवी पेठ! सोलापूरचे वैभव असलेला भुईकोट किल्ला त्याच पेठेत आहे. तो 1358 ते 1375 या दरम्यान बांधला गेला असावा. तेथे आतमध्ये बाग बनवली आहे, अठराव्या शतकातील दोन तोफा आहेत. देवालयासारखी एक वास्तू असून त्यावरील शिल्पकला हिंदू राजांनी केलेली आहे. त्या मंदिरातील शिवलिंग मल्लिकार्जुन मंदिरात आणले असावे असे सांगण्यात येते.
ज्योतिषशास्त्राला पंचांगाचा आधार देणारे कै. ल.गो. दाते यांनी 1916-17 मध्ये दाते पंचांग प्रसिद्ध केले. त्यांनी गणितातील स्थुलता घालवून अधिक सूक्ष्म असे दृक्गणित स्वीकारले व पूर्वीची ‘घटी-पळे’ देणारी वेळ रद्द करून घड्याळाच्या वेळा दिल्याने ते लोकप्रिय झाले. दाते पंचांगकर्ते लोकांकडून आलेल्या प्रश्नांचे निरसन करतात. त्यांची पंचांगे 1939 पासून पाच पाच वर्षांच्या संचात उपलब्ध झाल्याने अभ्यासकांची सोय झाली आहे. त्यांचे स्वत:चे गणेशमंदिरही आहे.
सोलापूरच्या दक्षिण कसबा पेठेतील ‘सुंद्री’ वादन म्हणजे सोलापूरची शान आहे. सुंद्री म्हणजे आकाराने छोटी सनई. सुंद्रीवादन कलेला जाधव घराणे सात पिढ्यांपासून जोपासत आहेत. अक्कलकोटच्या संस्थानचे राजा फत्तेसिंह यांनी ते वादन ऐकून तिला ‘सुंद्री’ हे नाव दिले. ती खैर वा सिसम लाकडाची बनवतात. लांबी अकरा इंच, त्यावर नऊ स्वररंध्रे असून वरील भाग निमुळता असतो. खालील भाग चंबूसारखा व मुखभागी ताडाच्या पानाची पत्ती असते. सुंद्रीवादनाला ‘खुर्दक’ या तालवाद्याची साथ असते.
प्रवचनकार, किर्तनकार, कविवर व लोकशाहीर अशा अनेक बिरुदावलीने अजरामर ठरलेले राम जोशी हे उत्तर कसब्यात जन्माला आले. ते आठशे वर्षांची परंपरा असलेल्या जोशी घराण्यात 1760 वा 1762 साली जन्मले. त्यांच्या घराण्याकडे पूर्वापार ग्रामजोशी हे मानाचे पद होते. ते आता त्यांच्या सहाव्या पिढीकडे आहे. – सुमारे एक हजार वर्षांपासूनचा देशमुखवाडा दक्षिण कसब्यात आहे. सिद्धरामेश्वरांचा आठशे वर्षांपूर्वीचा योगदंड त्या वाड्यात पुजला जातो.
सोळाव्या शतकातील मल्लिकार्जुनाचे हेमाडपंती मंदिर उत्तर कसबापेठेत आहे. तेथे दीडशे फूट खोलीची प्राचीन विहीर स्वच्छ पाण्याने भरलेली असते. त्या भागातील पत्रा तालीम प्रसिद्ध आहे.
हरिभाई देवकरण प्रशाला 1918 साली स्थापन झाली. ती शतकाच्या उंबरठ्यावर आहे. तर त्याच रेल्वे लाईन भागातील दुसरी नामवंत जुनी शाळा म्हणजे सोलापूर हायस्कूल! त्याच्या नंतर नॉर्थकोर्ट ही प्रशाला स्थापन झाली, 1855 साली! तब्बल एकशेसाठ वर्षांची ती प्रशाला होती सोलापुरातील पहिले हायस्कूल! संपूर्ण इमारत दगडी बांधणीची असून इतर अभ्यासक्रमांसाठी आणखी सहा इमारती बांधल्या गेल्या आहेत. त्या प्रशालेतील नामवंत विद्यार्थी आहेत – डॉ. द्वारकानाथ कोटणीस, शिल्पकार रावबहाद्दर मुळे, स्वामी रामानंदतीर्थ, शंतनुराव किर्लोस्कर, वालचंद हिराचंद, शेठ गुलाबचंद व रतनचंद हिराचंद, कवी कुंजविहारी, सोलापूरचे ‘विश्वकर्मा’ – नानासाहेब चक्रदेव, माजी नगराध्यक्ष – बाबासाहेब वारद, सर अब्दुल लतिफ, व्ही. आर. कुळकर्णी, मारुती चित्तमपल्ली, लक्ष्मी उद्योगसमूहाचे जयकुमार पाटील इत्यादी. त्या नामवंत शिक्षणसंस्थांप्रमाणेच गेल्या एकशेतेरा वर्षांपासून कार्यरत असलेले पहिले ‘महिला अध्यापक विद्यालय’ असलेले ‘मेरी बोर्डिंग विद्यालय’ व ‘वोरोनीको प्रशाला’ अतिशय प्रसिद्ध आहे.
– प्रमोद शेंडे
9920202889
मल्लिकार्जुन जैन मंदिर
जैन समाजात मुख्यत: दिगंबर व श्वेतांबर असे दोन संप्रदाय आहेत. सोलापूर जिल्ह्यात शेकडो जैन मंदिरे आहेत. परंतु शहरात सामाजिक ट्रस्ट संचलित मुख्यत 13 जैन मंदिरे आहेत. त्यापैकी दहा दिगंबर जैन व तीन श्वेतांबर जैन मंदिरे आहेत. (हद्दवाढ भागातील कुमठे येथील चंद्रप्रभू दिगबंर जैन मंदिर आहे. सहाशे वर्षे प्राचीन मंदिराचा सध्या जीर्णोध्दार सुरूआहे.)
प्राचीन पार्श्वनाथ मंदिर - सुमारे 800 वर्षांपूर्वी तात्या गोपाळ शेटे परिवाराने लक्ष्मी मंडईजवळ अतिशयकारी भ. पार्श्वनाथ मंदिराची स्थापना केली. तीन फूट उंच पितळी मूलनायक मंदिराचे कार्य सध्या डॉ. रणजित गांधी व परिवार पाहात आहेत. त्यानंतर सन 1849 साली हरिभाई देवकरण परिवारातील हरिचंद देवकरण व गांधी नथुराम देवकरण यांनी शुक्रवार पेठेतील आदिनाथ दि. जैन मंदिराची स्थापना केली सध्या सुनील गांधी हे अध्यक्ष आहेत. येथे चार फूट उंच काळ्या पाषाणातील मूर्तीसोबत अनेक प्राचीन मूर्र्तीही स्थापित झाल्या आहेत. या मंदिरालगतच हिराचंद गांधी स्थापित सुमारे 80 वर्षे प्राचीन रत्नत्रय दि. जैन मंदिर आहे.
बाळीवेस चौकात असलेल्या जैन बोर्डिंग अंतर्गत महावीर दि. जैन मंदिर आहे. याची स्थापना 1935 साली रावजी सखाराम दोशी परिवाराने केली. 1894 साली दत्तात्रय अण्णा बुबणे परिवाराने चाटी गल्लीतील आदिनाथ दि. जैन मंदिराची स्थापना केली. 1960 साली सम्राट चौकातील श्राविका आश्रम येथे पद्मश्री सुमतीबाई शहा यांनी भ. महावीर कमळ मंदिराची स्थापना केली. 2002 मध्ये आचार्य देवनंदी महाराजांच्या प्रेरणेने विजापूर रोड येथे भगवान बाहुबली मंदिर, कोंडी येथे भ. आदिनाथ मंदिराची स्थापना झाली.
श्वेतांबर संप्रदायानेही भरपूर प्रगती केली. जुनी मिल कंपाउंड येथे 1895 मध्ये शांतीनाथ श्वेतांबर जैन मंदिराची स्थापना झाली. रविशेखरजी महाराजांच्या प्रेरणेने या मंदिराचा जीर्णोध्दार होऊन प्राणप्रतिष्ठा होणार आहे. 1920 मध्ये पाबुदानजी निमाणी, रायचंदजी दोशी, चुनीलालजी शाह या धर्मप्रेमींनी प्राचीन भ. आदिश्वरांची मूर्ती आणून जोडभावी पेठ येथे भव्य मंदिराची स्थापना केली. 1997 मध्ये सम्राट चौक येथे शंकेश्वर पार्श्वनाथ मंदिराची स्थापना झाली. या तिन्ही मंदिरांची ट्रस्ट एकच असून तिलोकचंदजी निमाणी अध्यक्ष आहेत. श्वेतांबर समाजाची 9 वैयक्तिक मंदिरे आहेत. भगवान आदिनाथांपासून भगवान
महावीरांपर्यंत सर्व तीर्थकरांच्या मूर्ती शांततेची साक्ष देत आहेत.
4 दिवसांचं स्वातंत्र्य, 4 हुतात्म्यांना फाशी, सोलापूरच्या 'मार्शल लॉ'चा हा इतिहास माहिती आहे का? - BBC News मराठी
- हर्षल आकुडे,
- बीबीसी मराठी प्रतिनिधी.

(डावीकडून) मल्लप्पा धनशेट्टी, किसन सारडा, जगन्नाथ शिंदे, कुर्बान हुसेन
भारतीय स्वातंत्र्यलढ्याच्या इतिहासात कित्येक संघर्षपूर्ण आणि तितक्याच प्रेरणादायी घटनांचा समावेश आहे.
ब्रिटिश सरकारकडून स्वातंत्र्य मिळवण्यासाठी कित्येक ज्ञात-अज्ञात स्वातंत्र्यसैनिकांनी आपल्या जीवाची बाजी लावली. त्यांनी दिलेल्या बलिदानामुळेच आज भारताला स्वातंत्र्याची चव चाखता येत आहे, असं म्हटलं जातं.
भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील काही घटना ठळकपणे सर्वांना ज्ञात आहेत, तर काही घटनांविषयी फारशी माहिती उपलब्ध नाही.
भारताच्या इतिहासातील अशीच एक महत्त्वपूर्ण घटना म्हणजे सोलापूरचा स्वातंत्र्यलढा.
या लढ्याच्या माध्यमातून सोलापूरने देशाला स्वातंत्र्य मिळण्याच्या 17 वर्षांपूर्वीच चार दिवसांचं स्वातंत्र्य उपभोगलं होतं. 9, 10, 11 व 12 मे 1930 असे एकूण चार दिवस सोलापूर स्वतंत्र होतं.
त्या कालावधीत देशात इतर अनेक शहरांमध्येही आंदोलने झाली, पण केवळ सोलापूर शहरात 'मार्शल लॉ' लावून ब्रिटिश सरकारने ते लष्कराच्या ताब्यात दिलं होतं.
ब्रिटिश सरकारच्या 150 वर्षांच्या राजवटीत 'मार्शल लॉ'ची अंमलबजावणी करण्यात आलेलं एकमेव शहर म्हणजेच सोलापूर अशीही इतिहासात नोंद आहे.
अखेर, या संपूर्ण घटनाक्रमादरम्यान 12 जानेवारी 1931 रोजी सोलापुरातील चार हुतात्म्यांना फाशीही शिक्षा ठोठावण्यात आली होती.
यंदाच्या 12 जानेवारी 2023 रोजी चार हुतात्म्यांना फाशी देण्याच्या घटनेला 92 वर्षं पूर्ण झाली. तर आज, 9 मे 2022 रोजी चार दिवसाच्या स्वातंत्र्याला 92 वर्षं पूर्ण होतील.
त्यानिमित्ताने सोलापूरचा स्वातंत्र्यलढा, मार्शल लॉ आणि चार हुतात्मे या सर्व गोष्टींची आपण माहिती घेऊ -
सविनय कायदेभंग आणि सोलापूर
या संपूर्ण प्रकरणाची नाळ महात्मा गांधी यांच्या सविनय कायदेभंग चळवळीशी जोडलेली होती. महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली देशातला स्वातंत्र्यलढा जोर पकडू लागला होता.
1930 मध्ये गुजरातमध्ये साबरमती आश्रमात काँग्रेसच्या कार्यकारी बैठकीत महात्मा गांधीजींनी सविनय कायदेभंग चळवळीची घोषणा केली.

फोटो स्रोत, Getty Images
त्याचाच एक भाग म्हणून मीठाच्या कराविरुद्ध महात्मा गांधी यांनी 12 मार्च 1930 रोजी दांडी यात्रेस सुरुवात केली.
त्यावेळी सोलापुरात सार्वजनिक सभा, लोकसभा, जिल्हा सभा, मुंबई इलाखा प्रांतिक सभा यांची अधिवेशने आयोजित केली जात असत. दुसरीकडे वृत्तपत्रांचाही जनमानसावरील प्रभाव वाढत होता.
5 एप्रिल 1930 रोजी दांडी यात्रा संपन्न झाली. सविनय कायदेभंग आणि दांडी यात्रा यांना देशभरात प्रचंड प्रतिसाद मिळाला.
या आंदोलनात सोलापूरनेही भरभरून सहभाग नोंदवला. काँग्रेस कमिटीने मीठाच्या सत्याग्रहादरम्यान शहराच्या मध्यवर्ती भागात मीठाच्या पुड्या बनवून त्या जाहीर लिलावाने विकून कायदेभंगास सुरुवात केली.
जिथे समुद्र किनारा नाही तेथील लोकांनी दारुबंदीचा प्रचार करावा, ताडीची झाडे काढून टाकावीत, असं आवाहन महात्मा गांधींनी केलं होतं.
त्यानुसार, सोलापुरातील रुपाभवानी मंदिर परिसरात असलेल्या शिंदीच्या झाडांनाही सत्याग्रहींनी लक्ष्य केलं.
गिरणगाव म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सोलापुरात त्यावेळी पाच कापड गिरण्या होत्या. या कापड गिरण्यांमध्ये 15 ते 20 हजार कामगार त्यावेळी काम करत असायचे.
शहरात पुकारण्यात येणाऱ्या कोणत्याही आंदोलनांमध्ये या गिरणी कामगारांचा उत्स्फूर्त सहभाग असायचा.
त्या काळात सतत कोणत्या ना कोणत्या प्रभातफेरी, मोर्चे, संप यांचं आयोजन करण्यात येत असे. या सर्व आंदोलनांमुळे शहरातील वातावरण अतिशय स्फूर्तिदायक आणि देशभक्तीमय बनलं होतं.
'पकडे गये गांधीजी, अब तो निंद छोडो'
सविनय कायदेभंग चळवळीवर नियंत्रण मिळवण्यासाठी ब्रिटिश सरकारने महात्मा गांधी यांना अटक करण्याचा निर्णय घेतला.
त्यानुसार, गुजरातच्या कारडी गावात महात्मा गांधींना 4 मे 1930 रोजी अटक करण्यात आली. ही बातमी सोलापुरात 5 मे 1930 रोजी रात्रीच्या सुमारास पोहोचली.

फोटो स्रोत, Getty Images
गांधीजींच्या अटकेची माहिती मिळताच सोलापुरातील काँग्रेस कमिटीच्या कार्यकर्त्यांमध्ये अस्वस्थेतेचं वातावरण निर्माण झालं.
त्यावेळी श्रीनिवास काडगावकर नामक एक कार्यकर्ते आपल्या जोरदार आणि पहाडी आवाजासाठी ओळखले जात असत.
काडगावकर यांनी लागलीच डोक्यावर 'किटसन' बत्ती घेऊन गांधीजींच्या अटकेची माहिती लोकांना देण्यास सुरुवात केली.
'पकडे गये गांधीजी, अब तो निंद छोडो, नहीं चलेगी, नहीं चलेगी, जुलमी सरकार नहीं चलेगी,' अशा घोषणा देत त्यांनी रात्रभर लोकांना जागवलं आणि वातावरण निर्मिती केली.
पुढच्या दिवशी म्हणजेच 6 मे रोजी कडकडीत हरताळ पाळण्याचा संदेश काँग्रेस कमिटीने दिला.
त्यानुसार, 6 मे रोजी स्थानिक नेत्यांच्या जाहीर निषेध सभा झाल्या. काँग्रेसच्या वतीने रामकृष्ण जाजू यांनी गांधीजींच्या अटकेची अधिकृत माहिती सर्वांना दिली.
शहरात दिवसभर तणाव कायम होता. कापडगिरण्या, बाजारपेठा, व्यापारी व्यवहार वगैरे त्यादिवशी बंद ठेवण्यात आले.
दरम्यान, रस्त्यांवर आलेल्या जमावाचा असंतोष ठिकठिकाणी दिसू लागला. लहान-मोठ्या मिरवणुका, घोषणाबाजी, दारू दुकानांची नासधूस इत्यादी प्रकार सुरू झाले.
जमावातील एका गटाने मद्रास मेल अडवून ठेवली. लोकांमधील संतप्त भावना आवरणं आता कठीण झालं होतं. त्यामुळे ज्येष्ठ नेत्यांनी पुढच्या दिवशीचे (7 जानेवारी) सर्व कार्यक्रम रद्द केले.
पण युवक संघाला ही भूमिका पटली नाही. त्यांनी तिथंच सभा घेऊन कापड गिरण्या बंद करण्याचा आणि 3 दिवस हरताळ पाळण्याचा आदेश दिला.
7 मेच्या दिवशी सकाळपासूनच वातावरणात तणाव होता. शहरात लक्ष्मी-विष्णु मिलजवळ पोलिसांना गोळीबार करावा लागला.
दिवसभर मिरवणुका, पोलिसांची हुर्यो उडवणं, त्यांना गांधी टोपी घालायला लावणं, असे प्रकार सुरू होते.
नेत्यांनी सर्वांना शांतता राखण्याचं आवाहन केलं. उद्या गिरण्या बंद करू नका, शहरात हुल्लडबाजीला ऊत आला आहे, असं ते म्हणाले.
मात्र, गांधीजींच्या अटकेचा निषेध शक्य त्या मार्गाने केला गेला पाहिजे, या भूमिकेवर युवक संघाचे कार्यकर्ते ठाम होते.
पोलिसांविरुद्धचा संघर्ष
8 मे 1930 रोजी वीर नरिमन आणि जमनालाल बजाज यांच्या अटकेची वार्ता सर्वत्र पसरली. वीर नरिमन हे युवक संघाचे प्रमुख होते. त्यांच्या अटकेच्या निषेधार्थ एक मिरवणूक काढण्यात आली.
मिरवणूक संपवून नेते मंडळी परतली. दरम्यान, काही तरुण रुपाभवानी मंदिराकडे शिंदीची झाडे तोडण्यासाठी गेले. नियोजित कार्यक्रमानुसार असं काही ठरलेलं नव्हतं. पण तरूण आंदोलकांच्या उत्साहाला उधाण आलं होतं.
याची माहिती मिळताच पोलिसांनी कुमक बोलावून परिसरात नाकाबंदी केली. इन्स्पेक्टर नॅपेट हे पोलिसांच्या पथकाचं नेतृत्व करत होते. जमावाने दगडफेक करून पोलिसांना हुसकवण्याचा प्रयत्न केला, पण नॅपेट यांनी गोळीबार केला. शिवाय, 9 जणांना अटकही केली.
मात्र, तरीही जमाव मागे सरकला नाही. त्यांनी अटक केलेल्या तरुणांना सोडण्याची मागणी केली.
दरम्यान, या घटनेची माहिती सोलापूरचे तत्कालीन कलेक्टर हेनरी नाईट तसंच पोलीस उपअधीक्षक प्लेफेअर यांना देण्यात आली.
दोघेही आणखी जास्त कुमक घेऊन रुपाभवानी मंदिर परिसरात दाखल झाले. कलेक्टर हेनरी नाईट हे हातात बंदूक घेऊन आवेशातच गाडीतून खाली उतरले.
त्यांची ती भूमिका पाहून जमाव अधिकच संतप्त झाला. पकडलेल्या सर्वांना सोडा, या मागणीवर सर्वजण ठाम होते.
दगडफेकीत DSP फ्लेपेअर आणि 3 पोलीस जखमी झाले. पोलिसांकडील गोळ्या संपत असल्याचं पाहून जमावाने आणखी आक्रमकपणे पोलिसांचा विरोध सुरू केला.
या संघर्षाची माहिती मिळताच तरुण कार्यकर्ते मल्लप्पा धनशेट्टी आणि त्यांच्यासोबत जिवराज मुलूकचंद तिथे आले. मल्लप्पा धनशेट्टी यांचा शहरातील तरुणांवर प्रभाव होता. पकडलेल्यांची नावे लिहून घेऊन त्यांना सोडून द्या, अशी विनंती मल्लप्पा धनशेट्टी पोलिसांना करत होते.
इतक्यात शंकर शिवदारे नामक तरुण कार्यकर्ता हातात तिरंगा झेंडा घेऊन कलेक्टर नाईट यांच्या दिशेने धावत आला. तेव्हा कलेक्टर नाईट यांच्या जिवीतास धोका असल्याचं वाटून सार्जंट हॉल यांनी शंकर शिवदारे यांच्यावर गोळी झाडली.
शिवदारे जागीच कोसळले. या संपूर्ण घटनाक्रमात पहिला हुतात्मा म्हणून शंकर शिवदारे यांचंच नाव घेतलं जातं.
दरम्यान, शिवदारे खाली कोसळल्याचं पाहून संतप्त जमाव कलेक्टर नाईट यांच्या दिशेने चाल करून येऊ लागला. त्यांच्या वाहनाला घेराव घातला.
मात्र मल्लप्पा धनशेट्टी यांनी जमावाला रोखलं आणि कलेक्टर नाईट यांच्याशी केलेल्या चर्चेनंतर पोलिसांनी पकडलेल्या लोकांना सोडून दिले. त्यानंतर पोलिसांच्या गाड्यांना रस्ता मोकळा करून देण्यात आला. मात्र, यामुळे मल्लप्पा धनशेट्टी हेच जमावाचं नेतृत्व करतात, अशी कलेक्टर नाईट यांची धारणा बनली.
कलेक्टर नाईट यांनी जमावातून बाहेर पडत असताना अचानक पोलिसांना गोळीबार करण्याचा आदेश दिला. त्यामध्ये तीन जण धारातिर्थी पडले. अनेकजण जखमी झाले.
पोलिसांच्या अशा अनपेक्षित प्रतिक्रियेमुळे सोलापूरच्या जनतेत प्रचंड असंतोष निर्माण झाला. यानंतर मात्र सोलापुरात पोलीस आणि नागरिक यांच्यातील जोरदार संघर्ष शिगेला पोहोचला.
'4 दिवसांचं स्वातंत्र्य'
संतप्त जमावाने आपला मोर्चा जवळच्याच मंगळवार पेठ पोलीस चौकीकडे वळवला. पोलीस चौकीवर हल्ला करून जमावाने एका पोलीस कर्मचाऱ्याला मारहाण करून पेटवून दिलं.
तर दुसऱ्या एका पोलीस कर्मचाऱ्याला पोलीस चौकीला आग लावून आतमध्ये ढकलून दिलं. दोन पोलीस कर्मचारी यात मृत्युमुखी पडले.

सोलापुरातील ऐतिहासिक मंगळवार पेठ पोलीस चौकी
त्यानंतर जमाव गोलचावडी येथील कोर्टाकडे गेला. कोर्टाची कागदपत्रे, इमारत त्यांनी पेटवून दिली. हा संपूर्ण प्रकार तीन ते चार तास सुरू होता. पण सकाळच्या रुपाभवानी मंदिराकडील अनुभवामुळे कलेक्टर आणि पोलीस उप-अधीक्षक यांनी याबद्दल बघ्याची भूमिका घेतली.
दरम्यान, जमावाचा हा प्रक्षोभ पाहून इतर पोलीस चौक्यांमधील इंग्रज अधिकारी व इतर कर्मचारी यांनी शहरातून काढता पाय घेणंच उचित समजलं.
सोलापूर शहर शांत होत नाही, हे पाहून कलेक्टर हेनरी नाईट यांनी यासंदर्भात मुंबईला अहवाल पाठविला व लष्कराची मदत मागविली.
मुंबईच्या गृह सचिवांनी केंद्र सरकारला याबाबत कळवलं, "सोलापुरात 18 हजार कामगार मोकाट सुटले आहेत, ब्रिटिश अधिकारी व त्यांच्या कुटुंबीयांना धोका आहे, ते जीव मुठीत धरून जगत आहेत तरी लष्कर ताबडतोब पाठवावे.'
वरीष्ठ इंग्रज अधिकाऱ्यांनी सर्वप्रथम आपल्या कुटुंबीयांना रेल्वेमार्गे मुंबई-पुण्याकडे पाठवून दिलं. अधिकाऱ्यांनी सोलापूर रेल्वे स्थानकात आश्रय घेतला.
आपल्या कुटुंबीयांना एकत्रित करण्याच्या कामात व्यत्यय येऊ नये, लोकांचं लक्ष दुसरीकडे वेधलं जावं, यासाठी सशस्त्र पोलिसांकडून दुपारी एक वाजल्यापासून ते सायंकाळी सात वाजेपर्यंत दोन गाड्यांमधून गोळीबार यादरम्यान पोलिसांनी 103 गोळ्या चालवल्याची नोंद आहे. या गोळीबारात अनेकांचा मृत्यूही झाला.
यानंतर कलेक्टर नाईट हे रजेवर गेले. इतर इंग्रज अधिकारी पोलिसांच्या बंदोबस्तात रेल्वे स्टेशनवरच बसून होते.
9, 10, 11 व 12 मे 1930 असे पुढचे एकूण चार दिवस सोलापूर शहर एकप्रकारे स्वतंत्रच होतं. यादरम्यान, 10 मे रोजी बकरी ईदचा नमाज नेहमीप्रमाणे शांततेत पार पडला.
शहरातील विविध कामे युवक संघाच्या तरुण कार्यकर्त्यांना वाटून देण्यात आली होती. गांधी टोपी परिधान केलेले कार्यकर्ते पोलिसांनी पळून जाताना फेकलेल्या रायफली हातात घेऊन ट्रेझरीवर पहारा देत होते.
...आणि तिरंगा फडकला
शहरात कार्यकर्त्यांमार्फत रहदारी नियंत्रण तसंच इतर व्यवहार वगैरे कामे सुरळीत चालू होती. फक्त इंग्रज सरकारमधील अधिकारी किंवा पोलीस प्रशासनाची तिथं उपस्थिती नव्हती.
"ओस पडलेल्या पोलीस ठाण्यांमध्ये लोकांनी गाढवं नेऊन बांधली होती," असं इतिहास अभ्यासक डॉ. श्रीकांत येळेगावकर यांनी बीबीसीशी बोलताना म्हटलं.
शहरातील संपूर्ण व्यवस्थेचं नियंत्रण त्यावेळी सोलापूर काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष रामकृष्ण जाजू यांनी केलं. यामुळे त्यांना नंतर 'मार्शल जाजू' म्हणून नवी ओळख मिळाली, असं म्हटलं जातं.
या कालावधीत कलेक्टर कार्यालय, फौजदार चावडीवर तिरंगा झेंडा फडकविण्यात आला. संपूर्ण भारतात तिरंगा फडकवण्याचा मान मिळवणारी सोलापूर ही पहिलीच नगरपालिका ठरली होती.
या चार दिवसांच्या स्वातंत्र्याचा उल्लेख त्यावेळी 'गांधीराज' म्हणून केला जायचा, स्वातंत्र्य मिळाल्यावर भारतीय लोक त्यांचं राज्य कसे चालवतील याचा वस्तुपाठ सोलापूरकरांनी त्या चार दिवसांत घालून दिला, असं अभिमानाने सोलापूरकर सांगतात.
या कालावधीत मुंबई-पुण्याच्या वृत्तपत्रांमध्ये ब्रिटिश प्रोपगंडानुसार सोलापूर शहर गुंडांच्या ताब्यात गेल्याच्या बातम्या प्रसिद्ध होत होत्या. पण सोलापुरात 'कर्मयोगी' आणि 'सोलापूर समाचार' या वृत्तपत्रांनी संपूर्ण हकीकत मांडली. त्यांचे विक्रमी अंक यादरम्यान विकले गेले होते.
'मार्शल लॉ'
शहरातील सर्व व्यवहार आता सुरळीत सुरू असल्याचं काँग्रेस कमिटीने मुंबई सरकारला कळवलं होतं. पण तरीही स्थानिक इंग्रज अधिकाऱ्यांच्या विनंतीनुसार इंग्रज लष्कर 12 मे रोजी रात्री सोलापुरात दाखल झालं.

सोलापुरात चार हुतात्मा चौक येथे मल्लप्पा धनशेट्टी, श्रीकिसन सारडा, जगन्नाथ शिंदे आणि कुर्बान हुसेन यांचे पुतळे उभारले आहेत.
लष्कराने पोहोचता क्षणीच शहरात मार्शल लॉ लागू केला. दिसेल त्याला गोळी घालण्याचे आदेश जारी करण्यात आले होते.
यावेळी सोलापूरच्या नगरपालिकेवरील तिरंगा झेंडा काढण्याचा हुकूम लष्कराने दिला होता. पण नगराध्यक्ष माणिकचंद शहा यांनी त्यास नकार दिला, तेव्हा लष्करी न्यायालयाने त्यांना 7 वर्षे सक्तमजुरी व 1 लाख रुपये दंड अशी शिक्षा सुनावली.
तर तुळशीदास जाधव यांनी गांधी टोपी परिधान केल्यामुळे त्यांनाही 7 वर्षे सक्तमजुरी आणि 1 लाख रुपये दंड अशी शिक्षा देण्यात आली. (पुढे गांधी-आयर्विन करारानुसार यामध्ये सवलत देण्यात आली होती.)
मंगळवार पेठ पोलीस चौकी जळीतप्रकरणात 13 मे रोजी जगन्नाथ शिंदे, श्रीकिसन सारडा यांना तर 14 मे रोजी मल्लप्पा धनशेट्टी आणि कुर्बान हुसेन यांना अटक करण्यात आली.
त्यावेळी वरील चौघांसह शहरातील ज्येष्ठ काँग्रेस कमिटी कार्यकर्त्यांवर अतिशय अमानुष अत्याचार इंग्रज अधिकाऱ्यांनी केले.
दोरखंड बांधून, सिगारेटचे चटके देऊन त्यांना रात्रभर मारहाण करण्यात आली. दुसऱ्या दिवशी शहरात सर्वांची धिंडही काढण्यात आली. परिणामी शहरात स्मशान शांतता पसरली.
पकडलेल्या सर्वांवर खटले भरून त्यापैकी धनशेट्टी, सारडा, शिंदे आणि हुसेन यांना फाशीची शिक्षा सुनावण्यात आली. हायकोर्टानेही ही शिक्षा कायम केली.
शहरात मार्शल लॉ लागू असल्यामुळे वरील चौघेही आपलं निर्दोषत्व सिद्ध करण्यासाठी पुरावे आणू शकले नाहीत.
मार्शल लॉ कालावधीत पोलिसांवरील खर्च सोलापूरकरांवर जादा कर बसवून वसूल करण्यात आला. अखेर, 49 दिवसांनंतर शहरातील मार्शल लॉ 30 जून 1930 रोजी मागे घेण्यात आला.
4 हुतात्म्यांना फाशीची शिक्षा
सोलापूर शहरात मार्शल लॉ लागू झाल्यानंतर ब्रिटिश सरकारविरोधात कट रचणे, सरकारविरोधात कट करण्यासाठी जमावास एकत्रित करणे, ब्रिटिश सरकारच्या सेवेतील दोन पोलीस कर्मचाऱ्यांना जाळून मारणे, या आरोपांखाली जगन्नाथ रेवणसिद्धप्पा धनशेट्टी (वय 32, श्रीकिसन लक्ष्मीनारायण सारडा (वय 36), जगन्नाथ भगवान शिंदे (वय 24) आणि अब्दुल रसूल कुर्बान हुसेन (वय 20) या चार तरूणांना अटक करण्यात आली.
1. मल्लप्पा धनशेट्टी - मल्लप्पा धनशेट्टी हे पंढारकर पेढीत मुख्य मुनीम म्हणून काम करत. लोकांमध्ये ते विशेष लोकप्रिय होते.
सविनय कायदेभंगाच्या चळवळीत अनेक वेळा सभांचे अध्यक्ष वा प्रमुख वक्ते म्हणून असत. राष्ट्रीय चळवळीचं प्रतीक म्हणून ते नेहमी गांधी टोपी वापरायचे.
शहरातील सर्व प्रमुख कार्यक्रमांमध्ये त्यांचा सहभाग असायचा. सिद्धेश्वर प्रासादिक मंडळ, श्रद्धानंद समाज याठिकाणी त्यांचा वावर होता. सिद्धरामेश्वराच्या यात्रेमधील नंदीध्वज वाहकाचे काम करत असल्याने त्यांच्याभोवती धार्मिक वलयही होतं.
रुपाभवानी मंदिर परिसरात पोलीस-आंदोलक संघर्षादरम्यान जमावाला शांत करण्याचं कामही त्यांनी केलं होतं. पण त्याच दरम्यान कलेक्टर हेनरी नाईट यांचा रोष त्यांच्याबाबत तयार झाला होता.
2. श्रीकिसन सारडा - सोलापूर शहरातील सधन व्यापारी म्हणून यांची ओळख होती. सोलापुरातील अनेक सार्वजनिक कार्यक्रमांना ते मोठ्या उत्साहाने मदत करत.
यात्रा, सार्वजनिक उत्सव, त्या निमित्ताने होणारे कुस्त्यांचे आखाडे या कार्यक्रमांमध्ये ते आवर्जून सहभागी होत असत.
सारडा व मल्लप्पा धनशेट्टी हे चांगले मित्र म्हणून ओळखले जात. राष्ट्रीय चळवळीची आर्थिक बाजू सांभाळत इंग्रज सरकारचा त्यांच्यावर रोष होता.
3. जगन्नाथ शिंदे - युवक संघ व मजूर संघ यांचे सेक्रेटरी म्हणून जगन्नाथ शिंदे काम पाहत असत. ते तालीम संघाचेही सेक्रेटरी होते. शिंदे यांनी सोलापुरातील युवक वर्ग, कापड गिरणी कामगार व तालीम संघाची पैलवान मंडळी अशी ताकद राष्ट्रीय चळवळीमागे उभी केली.
कसरतीने कमावलेलं शरीर यांमुळे त्यांची तरुणांमध्ये विशेष ओळख होती. त्यांनी सोलापूरात राष्ट्रीय चळवळीला सामान्य माणसांच्या घराघरांत पोचवण्याचे काम केलं होतं. अभ्यासू वृत्ती व शैलीदार वक्तृत्व या गोष्टींसाठीही जगन्नाथ शिंदे यांचं नाव घेतलं जाई.
4. कुर्बान हुसेन - फाशीची शिक्षा ठोठावण्यात आलेल्यांपैकी कुर्बान हुसेन हेच सर्वात लहान होते. फ्रेम तयार करण्याचं काम करणाऱ्या कुटुंबात त्यांचा जन्म झाला होता.
सुरुवातीला गिरणी कामगार म्हणून त्यांनी कामाची सुरुवात केली. पुढे उत्तम लिखाण आणि वक्तृत्व गुणांमुळे ते सार्वजनिक जीवनात लोकप्रिय झाले. त्यांनी गझनफर नामक मराठी वृत्तपत्र सुरू केलं होतं.
कुर्बान हुसेन यांनी सोलापूरमधील कापड गिरण्यांमधून विखुरलेल्या अठरापगड जातींचा गिरणी कामगार सर्वप्रथम 'कामगार संघा'च्या माध्यमातून एकत्र आणला.
हजारोंच्या संख्येमध्ये असणारे सोलापूरचे गिरणी कामगार राष्ट्रीय चळवळीत सामील झाल्याने राष्ट्रीय चळवळीची ताकद कमालीची वाढली.
कोणत्याही कार्यक्रमात कुर्बान हुसेन यांचं भाषण होणार, हे ठरलेलंच असायचं. त्यांच्या या लोकप्रियतेमुळेच इंग्रज सरकारची वक्रदृष्टी त्यांच्याकडे गेली होती.
वरील चौघांना अटक करून त्यांची रवानगी पुण्याच्या येरवडा जेलमध्ये करण्यात आली. इंग्रज सरकारने या चौघांचा मंगळवार पेठ पोलीस चौकी जळीत प्रकरणात कसा सहभाग होता, ते पटवून दिलं.
हायकोर्टात न्या. माडगावकर यांनी चौघांच्या फाशीचं जन्मठेपेत रुपांतर करावे, अशी सूचना केली होती. पण इतर ब्रिटिश न्यायाधीशांनी त्याला असहमती दर्शवली. त्यानंतर धनशेट्टी, सारडा, शिंदे आणि हुसेन यांना फाशीची शिक्षा कायम करण्यात आली.
अभ्यासक डॉ. श्रीकांत येळेगावकर सांगतात, "चार वेगवेगळ्या समाजघटकांमधील तरुणांची नावे वेचून फाशीच्या शिक्षेसाठी निवडण्यात आली. सर्वच समाजांवर ब्रिटिश राजवटीची दहशत बसावी, असा सरकारचा प्रयत्न होता. पण या घटनेतून देशाची राष्ट्रीय एकात्मता दिसून आली. आजही ही घटना राष्ट्रीय एकात्मतेचं प्रतीक आहे."
12 जानेवारीच का?
सोलापूरच्या चार सुपुत्रांना ठोठावण्यात आलेल्या फाशीच्या शिक्षेची अंमलबजावणी करण्यासाठी इंग्रज सरकारने 12 जानेवारी 1930 चा दिवस निवडला होता.
सुरुवातीला 13 जानेवारी या तारखेबद्दल विचार सुरू होता. पण नंतर ती बदलून एक दिवस आधीच म्हणजे 12 जानेवारीचा दिवस निवडण्यात आला.

सोलापुरात मकर संक्रातीच्या दिवशी भरवण्यात येणारी श्री सिद्धेश्वर गड्डा यात्रा
सोलापूर शहरात 14 जानेवारी हा संक्रातीच्या सणाचा दिवस मोठ्या उत्सवाचा दिवस असतो. ग्रामदैवत सिद्धरामेश्वर यांच्या या उत्सवाला नऊशेहून अधिक वर्षांचा इतिहास आहे. या दिवशी संपूर्ण शहरात मानाच्या सात काठ्यांची मिरवणूक काढण्यात येते. याला गड्डा यात्रा म्हणूनही ओळखलं जातं.
या उत्सवाच्या पार्श्वभूमीवर यापुढे कुणीही ब्रिटिश सरकारविरुद्ध बंड करू नये, लोकांच्या मनात दहशत बसावी या हेतूने 12 जानेवारी 1931 हाच दिवस निवडला, असं अभ्यासक सांगतात.
12 जानेवारी रोजी सकाळी 6 वाजता चौघांनाही फाशी देण्यात आली. शिवाय चार हुतात्म्यांचे मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात न देता इंग्रज सरकारनेच त्यांच्यावर अंत्यसंस्कार केले.
ही बातमी सोलापूरला पोहोचल्यानंतर इतिहासात प्रथमच सिद्धेश्वर यात्रेनिमित्त निघणाऱ्या काठ्यांची मिरवणूक रद्द करण्यात आली होती.
आंतरराष्ट्रीय पातळीवर दखल
सोलापूरच्या चार हुतात्म्यांच्या या बलिदानामुळे देशातील अनेक स्वातंत्र्यसैनिकाना प्रेरणा मिळाली. तसंच आंतरराष्ट्रीय पातळीवर या घटनेची दखल घेण्यात आली.
कामगारवर्गीय सत्ता असलेल्या त्यावेळच्या रशियन नेत्यांनी मार्शल लॉ उठावाचा 'सोलापूर कम्यून' असं संबोधून गौरव केला होता. मॉस्को येथे रेडिओवरून यासंदर्भात बातमी प्रसारित झाली.
तसंच हा मुद्दा ब्रिटिश संसदेतही त्यावेळी उपस्थित करण्यात आला होता. बोल भिडूच्या एका लेखानुसार ब्रिटिश सरकारचा निषेध म्हणून मजूर पक्षाचे खासदार फेनर ब्रॉकवे यांनी सोलापूरच्या घटनेचा उल्लेख करत गांधी टोपी घालून ब्रिटिश संसदेत भाषण केलं होतं, हे विशेष.
पुढे भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहलाल नेहरू यांनी सोलापूरला भेट दिली होती. सोलापूर हे स्वातंत्र्य ज्योतीने प्रेरित झालेल्या धगधगत्या तरुणाईचे, हुतात्म्यांच्या रक्ताच्या बलिदानाने पवित्र झालेले 'शोला'पूर आहे, अशा शब्दांत जवाहरलाल नेहरुंनी सोलापूरचं कौतुक त्यावेळी केलं होतं.
संदर्भ -
आम्ही सोलापूरकर
आम्ही सोलापुरकर…
सोलापुर म्हटले की पहिली प्रतिक्रिया बहुदा, ‘ते चादरवालं?’ किंवा
‘बापरे काय तो उन्हाळा!’ यापैकी एक हमखास असते. हे ऐकून बहुतेक सोलापुरकर
इतके सरावलेले असतात की बर्याच वेळेला स्वतःच अशी ओळख करुन देतात. आपल्याच
गावाची नालस्ती करण्यात पुढाकार घेणारे हे महान लोक आहेत. पण त्यात कसलाही
न्युनगंड वगैरे काही नाही, ती त्यांची हल्ला टाळण्याची एक पद्धत आहे.
जगाच्या पाठीवर कुठेही दिसणारी आणि सोलापुरचे नाव ठळकपणे मिरवणारी चादर त्याच्या अभिमानाचा विषय जरुर आहे, पण या लोकांना स्वतःची टिमकी वाजवण्याची सवयच नाही. एखाद्या अस्सल सोलापुरीपुढे तुम्ही या चादरींचं कितीही तुफान कौतुक केलत तरी, ‘हां, हाये ते’ असा एक अत्यंत तोकडा उल्लेख होइल व विषय संपेल. आणि उन्हाळ्याचं म्हणाल तर खर्या सोलापुरी माणसाला त्याचा अजिबात त्रास होत नाही. फारच उन झालं तर तो शांतपणे सगळी कामं सोडून घरात बसतो, टोप्या वगैरे घालणे इथं भ्याडपणाच समजतात.
प्रत्येक गावाचे काही मानबिंदु असतात ( मानबिंदु जितके जास्त तितकी गावाची मान लांब असा निकष लावला तर पुणे म्हणजे एक जिराफ आहे!). सोलापुरचे मानबिंदु दोन – एक तर ४२ च्या चळवळीत फासावर गेलेले चार हुतात्मे आणि दुसरे सिद्धरामेश्वर. स्वातंत्र्य चळवळीत मार्शल लॉ लागू झालेलं हे एकमेव गाव अस प्रत्येक सोलापुरी मुलाने लहानपणापासून एकलेलं असतं. त्यामुळे पुस्तकात लिहीलेला इतिहास हा आपल्या गावात घडला हे एक जोरदार फिलींग इथं सर्वांना असतं. यामुळेच की काय कुणास ठाउक, पण भांडखोरपणा इथे ठासून भरला आहे. दोन सोलापुरी मित्र जेव्हा कोठेही भेटतात तेव्हा प्रथम पोटात गुद्दे मारुन, ‘काsss बे माज आलायं का लई’ असं कानडी हेलात जोरदार स्वागत करतात. शारिरीक जवळीक ही यांच्या एटीकेट्सचा एक भाग आहे. राजकारणात मात्र या भांडखोरपणामुळे कुठलेच नेतृत्व वा पक्ष इथं एकदम सेटल झालयं असं होत नाही.
मुळात हे एक सर्वार्थाने ‘मल्टिकल्चरल’ गाव आहे. मराठी,कन्नड,तेलगू आणि सोलापुरी हिंदी (ही एक वेगळी भाषा आहे!) अशा चार भाषा, अनेक पंथ, आणि संस्क्रुती याची ही एक भेळ आहे. त्यामुळे नुसतं सोलापुरात राहतो ह्या वाक्याला काही अर्थ नाही, सोलापुरात कुठं? हे महत्वाचं. ही सगळी विसंवादी पात्र एकत्र राहण्यामागे बसवेश्वरांच्या समन्वयवादी शिकवणीचा मोठाच वाटा आहे.
सोलापुरी मराठीलाही बेळगावप्रमाणे कन्नड हेल आहे. पण त्यातला गोडवा? तेवढं सोडून बोला. फटके मारल्यासारखं बोलण्याची इथे पदधत आहे. उदा. अमेरिकेवरुन परतलेल्या मित्राला ‘काsss बे अमेरिकेला जौन बी काळंच की बेss तू’, या थाटात चहा पाजतील. अर्थात मनात काही वाईट भावना ठेउन हे मुळीच नसतं. नवीन माणसं असल्या बोलण्याने गांगरतात आणि सोलापुरकरांबद्दल गैरसमज करुन बसतात. इथल्या दुकानदारांचे मराठी आणि धंदा करायची पद्धत तर अवर्णनीय आहे. एक तर जास्त माल दाखवणं हा अपमान समजतात, दुकानात जर काही नसेल तर ते आख्या सोलपुरातच नाही हे पटवतात किंवा ‘बोंबेउन मागवलेय’ या आश्वासनावर बोळवण करतात. कुठल्याही नव्या गोष्टीने हे एक्साईट होत नाहीत, आणि कमीतकमी शब्दात कशाचेही ग्लॅमर घालवण्यात तज्ञ आहेत. आमचा एक नवीन लग्न झालेला मित्र हौसेने बायकोला घेउन रुम फ्रेशनर घ्यायला गेला. ‘ते मिस्ट आहे काय हो’ अशा नाजुक विचारण्यावर; ‘सिद्ध्या, ते धुरळा उडतयं ते दाखव म्याडमला’, या थाटात पार कचरा करुन मालक पोट खाजवायला मोकळे झाले!
सोलपुरी हिंदी ही कचाकचा भांडायसाठी जगातली अत्यंत पावरबाज भाषा. मराठी
आणि हिंदी मधल्या ‘वेचक आणि वेधक’ शब्दांना सणसणीत कानडी फोडणी दिली की हा
पदार्थ बनतो. सोलापुरात बेगमपेठ नावाचा भाग आहे. असं म्हणतात की औरंगझेबाने
त्याच्या बेगमांना इथं ठेवलं होतं. यावर आमचे संशोधन असे की थोड्या
दिवसांनी जेव्हा तो लढाया करुन परत आला तेंव्हा बेगमांचं हिंदी एकून त्याने
हाय खाल्ली व त्यातच त्याचा अंत झाला!
खाण्याच्या बाबतीतही सोलपुरात
बरीच सरमिसळ आहे. सोलापुरची खासियत म्हणजे शेंगादाण्याची जहाल चटणी आणि
ज्वारीची भाकरी. हा पदार्थ जरी सर्व महाराष्ट्रात बनत असला तरी
सोलापुरकरांची त्यावर मास्टरी आहे. इडली हा त्यांचा दुसरा वीक पॉईंट,
अर्थातच इथे सीमाभागात असल्याचा प्रभाव स्पष्ट आहे. सोलपुरात कित्येक
होटेल्स केवळ सकाळी काही तास इडली-चटणी विकतात आणि बाकी वेळा बंद.
सोलापुरकरांचा अत्यंत आवडता विरंगुळा म्हणजे चित्रपट. सिनेमाचे इतके प्रचंड वेड असलेले दुसरे गाव कुठेही नसेल. इथे सिनेमा बघायला पाल़कांची परवानगी घेतली जात नाही (नवीन बालसंगोपनाच्या मागे लागून हा प्रकार अलीकडे सुरु झाल्याचे ऐकीवात आहे. काय चाललय हे?). मल्टीप्लेक्स नाव ही कुणाला माहिती नसल्यापासुन ती इथे आहेत. त्यामुळे सिनेमाला जाउन तिकीट मिळालं नाही म्हणुन परत येणं इथं पाप समजतात. हा नाही तर तो, कोणतातरी बघायचाच. त्यामुळे सहसा कुठला सिनेमा इथं फ्लॉप होत नाही. मिथुन, अमिताभ इ. इ.च्या पडत्या काळात सोलापुरी जनतेने त्यांना उदंड सहारा दिला आहे. लोकसंख्येच्या मानाने इथे खुपच – म्हणजे जवळपास १५ – थेटर्स आहेत. त्यातले काही फक्त कन्नड किंवा तेलुगू सिनेमे दाखवतात आणि सगळेच चालतात. असं आहे म्हणुन थेटर्स स्वच्छ वगैरे अजिबात नाहीत, उलट मुतारी, घाम, पानाच्या पिचकार्या आणि उच्छ्वास यांचा मिळुन येणारा दरवळ नसेल तर सिलेमाचा फीलच येत नाही. पंखे कधितरीच चालतात आणि उकाडा तर कायमचाच म्हणुन लोक शर्ट काढून डोक्याला गुंडाळतात. आवडतं गाणं लागलं की तोच फिरवून नाचतात किंवा धासू डायलॉगला हवेत उडवतात. शांतपणे सिनेमा पाहणे एकदम नामंजूर. त्यामुळे पुण्यात पहिल्यांदा सिनेमा पाहताना माझी जाम गोची झाली होती. तिथे काय सगळेच समीक्षक, त्यामुळे विनोदी प्रसंगालाही लोक दातातल्या दातात हसत होते. मी हैराण. सतत बडबड करीत सिनेमा पाहिला तरचं त्याचे पैसे वसूल होतात यावर आमचा पूर्ण विश्वास आहे. जुन्या काळात मुगले आझमच्या प्रिंट्स वरातीतून आणण्यापासून रेफ्युजी रिलीज झाल्यावर बच्चनचा मुलगा आला म्हणुन आख्या थेटरला पेढे वाटण्यापर्यंत या मॅडनेसचे अनेक किस्से आहेत.
मला नक्की खात्री आहे की हा लेख वाचूनही, ‘काsss बे लई ल्ह्याय्लास की’ या शब्दात माझे ‘कौतुक’ होईलं, खांद्यावर जोरदार बुक्की बसेल आणि मग आम्ही इडली खायला मोकळे होऊ!
औरंगजेब आणि सोलापूर
सोलापूरसाठी देखील सगळ्यात जास्त कार्य औरंगजेबने केल्याचा इतिहास आहे,
सोलापूर शहरात भुईकोट किल्ल्याच्या दुरुस्ती करून घेतली.
भुईकोट किल्ला असल्याने दक्षिणेतील सर्वात जास्त दारुगोळा याच किल्ल्यात साठवत. त्याचे कारण म्हणजे किल्ल्याच्या आत दारुगोळा ठेवणे व किल्ल्याच्या बाहेर दारू गोळा काढणे ह्यासाठी औरंगजेब सोलापूर किल्ल्यात सर्व दक्षिणेसाठी लागणारा दारुगोळा ठेवत असे.
तसेच जवळपास 1694 ते 1699 दरम्यानच्या काळात जवळपास साडेचार वर्षे सोलापूर व परिसरात वास्तव्य होते. कारण इथून स्वराज्यावर हल्ले करणे सोपे होते शिवाय जवळ होते. व भीमा व सीना नद्या असल्याने इतर सुविधा देखील सहज मिळत होत्या.
मंगळवेढा रोडवर बेगमपूर हे गाव देखील औरंगजेबने वसवले व त्यासाठी आपल्या बेगमच्या नावाने बेगमपूर नाव ठेवले, ह्याच ठिकाणी काही दिवस वास्तव्यास होते, कारण शहराबाहेर राहून नदीच्या किनारी राहत, व सैन्याला व राण्यांना संरक्षण करण्यासाठी सैन्याला देखील ह्या जागा व्यवस्थित होत्या.
तसेच सोलापूर मध्ये असलेल्या कंबर तलाव जीर्णोद्धार औरंगजेबने केला,
सोलापूर मध्ये असलेल्या सिद्धेश्वर तलावचा देखील जीर्णोद्धार औरंगजेबने केला होता.
त्याकाळी गाळ काढून शहर वासीयांना पाणी कमी पडू लागल्याने बेगमपेठ शेजारील जेल मागे एक विहीर खोदून त्याची बांधणी करून सोलापूरकर साठी औरंगजेबने पाण्याची सोय केल्याच्या नोंदी आढळतात.
सोलापूर किल्ला त्याला खूप आवडतं असल्याने त्याने किल्ल्या भोवतीचे खंदक खोदकाम करत मधील दुरुस्ती करून किल्ल्याला मजबुती केलेली होती, काही ठिकाणी पडलेला भाग दुरुस्त करून घेतलेला होता.
शिवाय त्याकाळी म्हणजे 16954 ते 1699 दरम्यान सोलापूर येथे विजापूर वेस मधील मशीदमध्ये येऊन नमाज अदा करत असे. अशी मशीद मोठी नव्हती पण त्या काळी असलेल्या भागात नमाज अदा करत.
तसेच सध्या सोलापूरचे रेल्वे स्टेशन आहे, त्याजागी पूर्वी एक चौथरा होता, त्यावर औरंगजेबचा तंबू असे, व त्याच्या आसपास त्याचे काही सैन्य राहत असे. जोपर्यंत नमाज व इतर काम असे त्यासाठी लागणारे मोजक्याच सैन्याला सोबत घेऊन औरंगजेब सोलापूर शहरात नेत असे, व उर्वरीत सैन्य रेल्वे स्टेशन च्या जागी असलेल्या तंबूजवळ ठेवी, आणि लढाऊ साठी नियुक्त असलेल्या सैन्याला पंढरपूर कडे असलेल्या वास्तव्याच्या जागी ठेवत असे.
त्याच्या बेगमराणी देखील नमाज अदा करण्यासाठी सोलापूर मध्ये येत असत,
सोबत दासी असत त्यांचा मुक्काम मशीद जवळ असत, त्या जागेस विजापूर वेस बाहेर
बेगमपेठ नावाने वसवले व त्या ठिकाणी बांधकामे करण्यात आली. आता देखील
त्याच नावाने भाग ओळखला जातो. त्यानंतर ज्यावेळी रमजान महिना असे
त्यावेळी महिनाभर बेगमराण्यासह व सैन्य सोबत घेऊन सोलापूरमध्ये राहत असे,
त्यावेळी सैन्याला खाण्यापिण्यासाठी व कपडेलत्ते खरेदीसाठी सोलापूर मधील
विजापूर वेस जवळपास छोटी छोटी दुकाने मांडत त्यात साडी चोळी, कपडे, चप्पल,
बूट, इतर साहित्य , घरगुती वस्तू कमीत कमी किंमतीत मिळत, व सैन्य दासी
येथेच खरेदी करत, तसेच ह्याच ठिकाणी रमजान उपवास साठी मिठाई देखील असे.
सुकामेवा बदाम, काजू, केशर, खजूर हे देखील अरब व अफगाणिस्तान कश्मीर कडून
आणून व्यापारी कमीतकमी किंमतीत विकत असत. ह्याचीच परंपरा म्हणून 1695 पासून
अजून देखील दरवर्षी महिनाभर विजापूरवेस, बेगमपेठ मध्ये हा बाजार दर
रमजानच्या महिन्यात भरतो, सर्वजण मुस्लिम समाज सोबतच इतर समाज देखील येथे
वस्तू कपडेलत्ते खरेदी करतात.
त्याशिवाय महत्वाचे म्हणजे सोलापूर किल्ल्याच्या मध्ये सुगंधी फुलांच्या बागा होत्या, त्या औरंगजेबच्या निरीक्षणात असत, त्याच्या सूचनेनुसार चालत. त्यामुळे ती फुले दररोजची तोडून ‘सोलापूर ते अफगाणिस्तान, व अरब भागात’ दररोज रवाना केली जात असे.
आणखी खुप सोलापूरसाठी वरदान लाभलेल्या आशा औरंगजेबकडून सोलापूरचा विकास
करण्यात आला, पण त्याने सोलापूरमध्ये केलेला बदल आज काही ठिकाणी अस्तित्वात
बघण्यासाठी उपलब्ध आहे.
सोलापूरचा भुईकोट
पण नवीन अध्ययनानुसार सोलापूर हे नाव सोळा गावांच्या एकत्रिकरणाने बनलेले नाही. शिवयोगी श्री सिद्धेश्वर लिखित शिलालेखानुसार सोन्नलगे असे संबोधले जायचे. कालांतराने सोन्नलगे चे सोन्नलगी असे रूपांतर झाले. आणि यादव वंशापर्यंत सोलापूरचे संबोधन सोन्नलगी असे होते. मोहोळ तालुक्यातील कामती येथे सापडलेल्या शके 1238 च्या संस्कृत शिलालेखानुसार सोलापूर नगरीला सोनलपूर असे संबोधले जातात. सोलापूर भुईकोट किल्ल्यात सापडलेल्या एका शिलालेखानुसार सोनलपूर असा उल्लेख होतो. तर त्याच किल्ल्यातील दुसऱ्या भिंतीवर सापडलेल्या शिलालेखानुसार या नगरीचा उल्लेख संदलपूर असे केलेले आहे.
मुस्लिम काळात या शहराला सोनलपूर असे संबोधण्यात येत होते. काळाच्या ओघात सोनलपूर मधील 'न' गाळला जाऊन सोलपूर नंतर सोलापूर असे नाव प्रचलित झाले असावे. त्यानंतर ब्रिटिश शासनांनी सोलापूर ऐवजी शोलापूर असे उच्च्यार कायम केले.
सध्याचा सोलापूर जिल्हा हा पूर्वी अहमदनगर, पुणे व सातारा या जिल्ह्याचा भाग होता. इ स वी सन 1838 ला अहमदनगरचा उपजिल्हा बनला. त्यामध्ये बार्शी, मोहोळ, माढा, करमाळा, इंडी, हिप्परगी आणि मुद्देबिहाळ हे उपविभाग होते. इ स वी सन 1864 मध्ये हा उपविभाग काढून टाकण्यात आला. इ स वी सन 1871 मध्ये सोलापूर, बार्शी, मोहोळ, माढा आणि करमाळा हे उपविभाग व सातारा जिल्ह्यातील पंढपूर, सांगोला उपविभाग एकत्र करून सोलापूर जिल्ह्याची निर्मिती करण्यात आली व इ स वी सन 1875 मध्ये माळशिरस हे उपविभाग देखील सोलापूर जिल्ह्याला जोडण्यात आले. 1956 मध्ये राज्य पुनर्रचनेनुसार सोलापूरचा समावेश मुंबई राज्यात करण्यात आला. व इ स वी सन 1960 मध्ये महाराष्ट्राचा एक परिपूर्ण जिल्हा म्हणून विकसित झाला.
स्वातंत्रपूर्व काळापासून स्वातंत्र मिळवण्याआधी सोलापूरचे महत्व भारताच्या इतिहासात अद्वितीय आहे. सोलापूरच्या नागरिकांना तीन दिवसापासून म्हणजे शके 1930 ला मे 9, 10, 11 स्वातंत्र मिळाले. थोडक्यात इतिहास अशाप्रकारे कार्य करतो. मे 1930 ला महात्मा गांधी यांना अटक झाली. संपूर्ण भारतभर ब्रिटिश नियमाचे आयोजन करण्यात आले. मोठ्या प्रमाणात मोर्चे व आंदोलन देखील सोलापूरात करण्यात आले. पोलिसांच्या गोळीबारात अनेक नागरिकांचा जीव गमवावा लागला. यामुळे प्रक्षुब्ध जमावाने चपळ स्टेशनवर हल्ला केला. पोलिस आणि अन्य अधिकारी सोलापूर शहराच्या बाहेर पळत होते. या काळात कायदा सुव्यवस्थेची जबाबदारी आणि नागरिकांच्या सुरक्षेची जबाबदारी काँग्रेस पक्षाच्या नेत्याच्या खांद्यावर होती. त्यानंतर इतर काँग्रेसचे नेते श्री. रामकृष्ण जाजू यांनी 1930 मे मध्ये 9, 10, 11 या तीन दिवसांच्या काळात कायदा व सुव्यवस्था राखली.
स्वातंत्र्यापूर्वीच इ स वी सन 1930 मध्ये महापालिकेच्या इमारतीवर सर्वप्रथम राष्ट्रीय ध्वज फडकवणारी भारतातील एकमेव नगरपालिका होती. याचा थोडक्यात इतिहास म्हणजे - महात्मा गांधी यांच्या दांडी यात्रेची प्रेरणा घेवून सोलापूरमधील स्वातंत्र सैनिकांनी सोलापूर पालिकेवर राष्ट्रध्वज फडकवण्याचा निर्णय घेतला त्याप्रमाणे 6 एप्रिल 1930 रोजी पुण्याचे जेष्ठ स्वातंत्रसैनिक श्री. अण्णासाहेब भोपटकर यांनी सोलापूर पालिकेवर राष्ट्रध्वज फडकावला. संपूर्ण देशभरात ही पहिली व एकमेव घटना होती. या घटनेने संतापून ब्रिटिश राज्यकर्त्यांनी सोलापूर येथे मार्शल लॉं घोषित केले. अनेक नेत्यांना व निर्दोष नागरिकांना खोट्या आरोपाखाली अटक केली. स्वातंत्रसैनिक श्री मल्लप्पा धंनशेट्टी, श्री कुर्बान हुसेन, श्री जगन्नाथ शिंदे व श्री किसन सारडा यांना मंगळवार पोलिस ठाणे मध्ये दोन पोलिसांच्या हत्याच्या आरोपाखाली अटक करण्यात आली. निम्न न्यायालयाने या स्वातंत्र्यसैनिकांना मरेपर्यंत फाशीची शिक्षा सुनावली. उच्च न्यायलनाने पण वरील शिक्षा कायम ठेवली व या चार स्वातंत्र्यसैनिकांना 12 जानेवारी 1931 रोजी फाशीची शिक्षा देण्यात आली. या स्वातंत्र्यसैनिकांचा आदर म्हणून शहराच्या मध्यवर्ती भागात पुतळे बसवण्यात आले व त्या स्थानाला हुतात्मा चौक असे नामकरण करण्यात आलेले आहे.
*अौदुंबर पवार*
सोलापूर शहराचा इतिहास इसवी सनाच्या दहाव्या-अकराव्या शतकाच्या मागे ढकलता येत नाही. त्या काळापूर्वीचे सोलापूरचे अस्तित्व ठरवायचे झाल्यास ठोस व बळकट पुरावे द्यावे लागतील. परंतु तसे पुरावे उपलब्ध नाहीत.
सांप्रत, सोलापूर शहर परिवहन कार्यशाळेसमोरच्या बुधवार पेठेतील नवनिर्मित बौद्ध विहाराजवळ काही वर्षांपूर्वी शिलालेख सापडला. तो सर्वज्ञ चक्रवर्ती चालुक्य सोमेश्वर तिसरा (इसवी सन 1127-1168) याच्या कारकिर्दीतील आहे. अभिलाषितार्थ चिंतामणी अथवा ‘मानसील्लस’ या ग्रंथांचा कर्ता तोच. महामंडलेश्वर कलचुरी बिज्जलदेव दुसरा (इसवी सन 1130-1168) याची सत्ता त्या विभागावर होती. त्याची राजधानी मंगळवेढ्यास होती. वीरशैव मतोद्धारक बसवेश्वर हे त्याच्या दरबारात मंत्री होते. पुढे बिज्जलदेवाने चालुक्यांची सत्ता अपहरण करून तो स्वत: सत्ताधीश झाला व त्याने त्याची राजधानी बीदर जिल्ह्यातील कल्याण येथे हलवली. बिज्जलदेवाचा स्थानिक अधिकारी महाप्रधान श्रीकरण कन्नप्पय्य नायक यांनी त्या ठिकाणी एक त्रिकारात्मक मंदिर निर्माण केले. त्या त्रिकुटातील स्थापित देवतांची नावे अनुक्रमे कन्नेश्वर, चट्टेश्वर आणि मल्लिकार्जुन. त्या मंदिरांना बिज्जलदेवांनी भूदान दिले आहे. त्या सर्व नोंदी शिलालेखामध्ये नोंदवताना ते मंदिर सोन्नलिंगे (सोलापूर) येथे उभारण्यात आल्याचे म्हटले आहे. त्या लेखाची तारीख आहे 22 डिसेंबर 1135. सोलापूर अस्तित्वात असल्याचा स्पष्ट असा तो पहिला पुरावा होय. त्याचा अर्थ असा नव्हे, की ते गाव त्या काळापूर्वी अस्तित्वातच नव्हते! त्याचे अस्तित्व जरूर असणार; परंतु त्याचा इतिहास मागे किती न्यायचा याचा विचार अनेक अंगांनी करावा लागेल. तत्कालीन ते स्थान व्यापारपेठ अथवा राजकीयदृष्ट्या महत्त्वाचे होते, अशा नोंदी पुराभिलेखांतून व तत्कालीन ग्रंथातून मिळत नाहीत. तसे जर असते तर बलचुरी बिज्जलदेव किंवा त्या राजघराण्यातील पूर्ववर्ती सत्ताधिकारी यांनी त्यांची राजधानी मंगळवेढ्यास न ठेवता तो मान सोलापुरास दिला असता. परंतु शिवयोगी सिद्धरामांच्या श्रीशैल यात्रेनंतर, त्यांनी सोलापूर येथे निर्माण केलेल्या कपिलसिद्ध मल्लिकार्जुन मंदिराच्या प्रसिद्धीमुळे सोलापूर प्रकाशझोतात आले. यथाकाल, सिद्धरामांनी तलावनिर्मिती करून त्या गावाचा पाणीप्रश्न सोडवला. त्यापुढे सोलापूरच्या प्रगतीत कोठे अडसर आल्याचे दिसून येत नाही.
इसवी सन 1135 च्या शिलालेखात उल्लेखलेले त्रिकटात्मक मंदिर अस्तित्वात नाही. ते कोठे होते, कसे होते याबद्दल काही माहिती नाही. ते काळाच्या उदरात नामशेष राहिले आहे.
सिद्धरामनिर्मित कपिलसिद्ध मल्लिक्कार्जुनाचे मंदिर (इसवी सन 1130-1180) अवशेष स्वरूपात किल्ल्यामध्ये उभे आहे. किल्ल्याची निर्मिती ही नंतरची आहे. कल्याण चालुक्याची उत्तम मंदिर निर्मिती म्हणून त्या वास्तूकडे बघण्यास हरकत नाही. हंपी (विजयनगर) चे कवी राघवांक (सुमारे इसवी सन 13 वे शतक) यांनी सिद्धराम पुराणांची पद्यात्मक रचना केली आहे. त्या कृतीचे मूळ नाव ‘सिद्धराम चरित्र’. तो ग्रंथ लिहिताना राघवाकांनी कपिलसिद्ध मल्लिकार्जुन मंदिराचे वर्णन करताना त्या परिसरातील इतर मंदिरांचेही वर्णन केले आहे. परंतु त्यातील एकही शिल्लक नाही!
पुढील काळात अनेक राजकीय स्थित्यंतरे झाली. पारतंत्र्याच्या काळात व त्या आधीच्या मुसलमानी कारकिर्दीत, असहिष्णू मताच्या मंडळींनी कपिलसिद्ध मल्लिकार्जुन मंदिराची जेवढी विटंबना व नासधूस करता येईल तेवढी केली. कालांतराने, भक्त मंडळींना पूजा-उत्सवादी करणे कठीण झाले. त्यामुळे स्थानिक सद्भक्त मंडळींनी निर्णय घेऊन जुन्या मंदिरातील काही खांब आणि उपयुक्त शिलासामुग्री एकत्र करून उत्तर कसबा येथील मल्लिकार्जुन मंदिर निर्माण केले. तो सन आहे इसवी सन 1821. कपिलसिद्ध मल्लिकार्जुन म्हणजे सोन्नलिगे पुखराधिश्वर; अर्थात सोलापूरचे ग्रामदैवत होय.

मध्ययुगीन
मुस्लिम राजवटीत बहामनीकडून तेथे भुईकोट उभारला गेला. त्याच्या बांधकामात
हिंदुमंदिराचे ताशीव दगड, मूर्तिशिल्प, अनेक कोरीव स्तंभ वापरण्यात आले
आहेत. त्याचा अर्थ उघड आहे, की परिसरातील हिंदुमंदिरे
उध्वस्त करून, मोडतोड करून त्यांची शिळासामग्री किल्ला बांधताना वापरली
गेली आहे. कालांतराने, तो किल्ला बहामनीकडून विजापूरच्या आदिलशहाने वीस मण
सोने देऊन विकत घेतला अशी नोंद इतिहासातून मिळते.बहामनी व आदिलशाही काळात तेथे अनेक मशिदी, दर्गे व विहिरी यांची निर्मिती झाली. तथापी, कालौघात त्यातील ब-याच वास्तू नष्ट झाल्या व ज्या शिल्लक आहेत त्यात परिवर्तन झाले असल्याचे आढळून येते. त्या दोन्ही शाह्यांकडे सेवा रुजू केलेला एक अधिकारी नायब जाबित खान म्हणून होता. त्याने त्या शाह्यांसाठी बरीच खटपट करून पुष्कळ इमारतींची, वास्तूंची निर्मिती केली. अली आदिलशाह (इसवी सन 1657-1672) करता त्याने किल्ल्यामध्ये महाल उभारल्याची नोंद शिलालेखामध्ये सापडते. त्या सर्व वास्तू कालपुरुषाने स्वाहा केल्या आहेत. कालाय तस्मै नम:, दुसरे काय!
सोलापूर शहरातील भुईकोट किल्ल्याचा परिसर मोठा आहे. किल्ल्यात जाण्यासाठी पाच रुपयांचे तिकिट आहे. आतमध्ये बाग आहे, पण देखभाल होत नसल्याचे जाणवले. दोन पोलादी तोफा व एक माहिती देणारा दगडी फलक लावला आहे. आतमध्ये नमाजासाठी पडकी मशिद आढळली. ती अनेक खांबी आहे. पुढे छोटा हौद आहे. त्यात दगडी कलाकुसर हिंदु पद्धतीची आहे. आतमध्ये सभोवताली चिंच, बाभूळ, बदाम, कडुनिंब असे मोठमोठे वृक्ष आहेत. कारंजांच्या जागाही आहे, पण पाणी नसल्याने ते कोरडे आहेत!
सोलापूरचा किल्ला नक्की केव्हा बांधला याबद्दल मतभिन्नता आढळते. कॅम्पबेल यांच्या मते बहामनी बादशहा महंमदशहा याने तो 1358 ते 1375 या दरम्यान बांधला असावा तर डॉ. हंटर यांच्या मते, तो 1345 मध्ये बांधला असावा. तोरो यांच्या मताप्रमाणे, हसन गंगू बहामनी याने बाहेरील कोट 1313 मध्ये तर आतील कोट हिंदू राजांनी बाराव्या शतकात बांधला आहे. सोलापूरचे मल्लिकार्जुन पाटील यांनी हा किल्ला इ.स. 1456 साली बांधला असे मत नोंदवून ठेवले आहे. दुसरा महंमदशहा बहामनी (1466 ते 1482) यांचा हुशार दिवाण महमद गवान याने सोलापूर व परांडा हे दोन्ही समान बांधण असलेले किल्ले एकाचवेळी बांधले असावे, असे काहींचे मत आहे.
सोलापूरच्या भुईकोट किल्ल्यात हेमाडपंथी अवशेष आढळतात. त्या किल्ल्यात पूर्वी तीनशे घरे होती. उत्तरेच्या भिंतीत बुजलेले देऊळ आढळते. त्याचे उत्खनन 1919 साली झाले व ते चालुक्य देवालय असल्याचे कळले. तेथे हिंदू स्थापत्यकलेची ओळख सांगणारी शिल्पे कोरलेली दिसतात.
मुघल बादशहा औरंगजेब १६८५-८६ या काळात सुमारे वर्षभर या किल्ल्यावर राहिला होता. येथेच त्याच्या टांकसाळीतून चांदीची नाणी निर्माण झाल्याचे पुरावे आढळतात. ती नाणी कोलकता येथील म्युझियममध्ये आढळतात. १७९५ ते १८१८ या काळात हा किल्ला मराठ्यांच्या ताब्यात होता. दुसरा बाजीराव पेशवा यांचा निवास या किल्ल्यावर होता. इंग्रजांनी सोलापूरवर आक्रमण करून बाजीरावाचा पाडाव मे, १८१८ मध्ये केला.
मुंबई-हैद्राबाद हा महामार्ग सोलापूर शहरातून जातो. सोलापूर शहरात भुईकोट प्रकारचा किल्ला आहे. हा किल्ला ‘सोलापूरचा भुईकोट किल्ला’ म्हणून ओळखला जातो.मध्यकालीन इतिहासामध्ये सोलापूरच्या किल्ल्याला अतिशय महत्वाचे स्थान प्राप्त झाले होते. बहमनींच्या राज्याची शकले उडाल्यावर त्यातून पाच शाह्या निर्माण झाल्या. या पाच शाह्यांनी आपली वेगळी चूल मांडली. या पाचही राजवटीच्या मध्यवर्ती ठिकाणी सोलापूरचे भौगोलिक स्थान होते. त्यामुळे सोलापूरचे महत्त्व वाढले.इतिहाससोलापूरचा किल्ला नेमका कोणी बांधला या बाबत अजूनही तज्ज्ञांमध्ये एकवाक्यता आढळत नाही. काहींच्या मते हिंदू राजांच्या काळात बांधलेल्या या किल्ल्याभोवती महमूद गावान याने दुसरी तटबंदी बाहेरून बांधून किल्ला अभेद्य केला. महमूद गावान हा बहमनी सुलतान महंमदशाह याचा दिवाण होता.इतिहासातील अनेक घटनांचा साक्षीदार असलेला सोलापूरचा किल्ल्या अनेक राजवटीचे आश्रय स्थान होता. या ऐतिहासिक घटनांमध्ये एक गमतीशीर मजाही आहे. ती म्हणजे सोलापूरचा किल्ल्ला हा लग्नामध्ये हुंडा म्हणून दिल्याची नोंद आहे. ही नोंद एकदा नाही तर दोन वेळा आहे.अहमदनगर येथे बुऱ्हाण निजामशहा गादीवर होता. तर विजापूर येथे इस्माईल आदिलशहा सत्तेवर होता. त्यांच्यामध्ये सलोख्याचे संबंध प्रस्थापित झाले होते. हे संबंध दृढ करण्याच्या दृष्टीने एक विवाह संबंध घडवून आणण्यात आला. आदिलशहाच्या कन्येला बुऱ्हाण निजामशहाला देऊन हा लग्नसमारंभ धुमधडाक्यात साजरा करण्यात आला. हा विवाह सोलापूरच्या किल्ल्यामध्ये झाला. त्यावेळी म्हणजे, इ.स. १५२३ मध्ये हा किल्ला विजापूरच्या ताब्यात होता. जावयाला हुंडा म्हणून सोलापूरचा किल्ला देण्याचे आदिलशहाने जाहीर केले होते. पण विवाहानंतर आदिलशहाने हा किल्ला देण्याचे नाकारले. त्यातून पुढे निजामशहा आणि आदिलशहा यांच्यात युद्धही झाले. या युद्धात जावई निजामशहाचा पराभव झाला. दुसऱ्यावेळी इ.स. १५५२ मध्ये अहमदनगरची राजकन्या चांदबिबी अली आदिलशहाला देण्यात आली. तर अली आदिलशहाची बहीण हदिया सुलताना हिचा विवाह मुतर्जा निजामशहाशी करण्यात आला. तेव्हा मात्र कबूल केल्याप्रमाणे निजामशहाने हा किल्ला विजापूरच्या सुलतानाला हुंडा म्हणून दिला.सोलापूरचा किल्ला बहमनी, आदिलशाही, निजामशाही नंतर मोगल सत्तेत आला. औरंगजेबाच्या कारकिर्दीत त्याचा बराच काळ या किल्ल्याच्या परिसरात गेला. पुढे हैदराबादच्या निजामाच्या आणि नंतर मराठ्यांच्या ताब्यात हा किल्ला गेला.
किल्ल्यावर पाहण्यासारखे : सोलापूरचा किल्ला दुहेरी तटबंदीचा आहे. खंदकाच्या आत असलेल्या या दुहेरी तटबंदीमुळे सोलापूरचा किल्ला अभेद्य आणि बलदंड झालेला आहे. याच्या बाहेरील तटबंदीमध्ये चार कोपऱ्यांवर चार बलदंड बुरूज आहेत. या बुरुजांना एकमेकांना जोडणाऱ्या तटबंदीमध्ये आणखी २२ बुरूज बांधून बुरुजांची एकभक्कम साखळीच निर्माण करण्यात आली. साधारण तीस फूट उंचीची तटबंदी असून त्यावर जागोजाग माऱ्यासाठी केलेल्या जंग्या दिसतात. बुरुजांवर तोफा ठेवण्याची सोय करण्यात आली आहे.बाहेरील भक्कम तटबंदीच्या आत असलेली दुसरी तटबंदी उंच आहे. याच्याही चार कोपऱ्यांवर चार बुरूज असून ते अधिकच उंच बांधण्यात आलेले आहेत. या बुरुजांवरून दूरवर टेहळणी करता येत असे. किल्ल्याच्या एका बाजूला सिद्धेश्वर तलावामुळे नैसर्गिकपणा आला आहे.सोलापूरचा किल्ला हा पुरातत्त्वखात्याच्या अखत्यारीत आहे. किल्ल्यात प्रवेश करण्यासाठी नाममात्र शुल्क आकारण्यात येते. किल्ला आणि त्याचा परिसर सुशोभित केलेला आहे. किल्ल्याचे दरवाजे अतिशय भक्कम असून शहर दरवाजा, हत्ती दरवाजा, खाती दरवाजा अशा नावानी ते ओळखले जातात. किल्ल्यामध्ये ध्वस्त झालेले मंदिर तसेच अनेक इमारतीचे अवशेष पहायला मिळतात. नागबावडी विहीर आणि इंग्रजकालीन तोफा ही वैशिष्ट्यपूर्ण आहेत.इतिहास आणि भक्कम बांधकाम यामुळे सोलापूरचा किल्ला आपल्या स्मरणात राहतो.
सिद्धेश्वर मंदिर हे इथल्या भागात प्रसिद्ध आहे.. मंदिराच्या परिसरात बरीच लहान-मोठी शिवलिंग आहेत.. सिद्धेश्वर / सिद्धराम / सिद्धरामेश्वर हे १२ व्या शतकातील सोनल्ल्गी / सोलापूरचे राजे.. त्यांनी लिंगायत धर्माचा प्रसार केला आणि ते एक उत्कृष्ट अध्यात्मिक कवी होते.. त्यांनी लिहिलेली अध्यात्मिक वचने ही अजूनही नित्यनेमाने वाचली जातात.. कोणी एक तरुणी सिद्धराम यांच्या संतवाणीने भारून गेली होती आणि तिने सिद्धराम यांच्याशी लग्न करण्याची इच्छा बोलून दाखवली.. पण सिद्धरामांनी त्यास नम्रपणे नकार दिला.. पण त्याच्या योगदंडाशी तिला लग्न करण्याची परवानगी त्यांनी दिली.. या घटनेच्या स्मरणार्थ दरवर्षी इथे गड्ड्याची यात्रा भरते.. लाखो भाविक सिद्धेश्वराच्या दर्शनास दूरदुरून येतात. इथला सिद्धेश्वर तलाव हा बाराव्या शतकात सिद्धरामेश्वर आणि त्यांच्या अनुयायांनी बांधल्याचे इतिहासकार सांगतात..
श्री सिद्धरामेश्वर हे सोलापूरचे ग्रामदैवत! महाराष्ट्र, कर्नाटक व आंध्र प्रदेश या तीन राज्यांतील भक्तांचे ते आराध्य दैवत! सिद्धेश्वर मंदिराचा परिसर छत्तीस एकरांचा आहे. तिन्ही बाजूंला सरोवर आहे व ते स्वच्छ ठेवले आहे. मंदिराआधी डाव्या बाजूस ग्रंथालय व पुढे हनुमान मंदिर आहे. मुख्य मंदिर भव्य आहे. मंदिरावर व कळसावर कलाकुसर आहे. रोज अन्नछत्र असते व मंदिरात येणाऱ्या भाविकांना त्याचा लाभ घेता येतो. मंदिरात स्वच्छता आढळते. गाभाऱ्यात शंकराची पिंडी असून त्यावर मुखवटा बसवला आहे.
मंदिराच्या पंचकमिटीच्या वतीने शैक्षणिक क्षेत्रात बारा विद्यालये व दोन महाविद्यालये चालवली जातात. विद्यार्थी वसतिगृहही आहे. तेथे कोणतीही देणगी न घेता प्रवेश दिला जातो. राहणे व जेवण मोफत आहे. मंदिरात लायब्ररीही आहे.
सोलापूरचे जुने नाव सोन्नलगी! श्री शिवयोगी सिद्धरामेश्वर या सिद्धपुरुषाने बाराव्या शतकात सोलापुरात अवतारी कार्य केले. त्यांची महती अशी होती, की ते जेथे जात ती भूमी पुण्यक्षेत्र होई. त्यांनी सोलापुरात अडुसष्ठ शिवलिंगांची स्थापना केली व छत्तीस एकर क्षेत्रफळाचे सरोवर निर्माण केले. तोच सिद्धेश्वर तलाव! तलावाच्या मध्यभागी बेट तयार करून तेथे तपश्चर्या केली, तेथे सिद्धेश्वर मंदिर उभे आहे. त्या काळात त्यांनी अनेक लोकोपयोगी कामे केली, समाजसुधारणा केल्या. विशेष म्हणजे त्या काळी गोरगरिबांचे सामुदायिक विवाह लावून दिले. दरवर्षी मकर संक्रातीला तेथे यात्रा भरते (12 जानेवारी ते 16 जानेवारी). तैलाभिषेक, काठ्यांची मिरवणूक, अक्षता सोहळा असे धार्मिक कार्यक्रम होतात. लक्षावधी लोक जमतात ते सर्व पांढऱ्या पोशाखात! पांढरी टोपी, सदरा, धोतर वा लेंगा असा सर्वांचा वेष असतो. भाविकांना यात्रा काळात राहण्यासाठी यात्री निवासाची सोय आहे.
सोलापूरातील रुपाभवानीचे देऊळ मोठे आहे. त्या देवळातील आतील भाग दगडी व कलाकुसरयुक्त आहे. त्या मंदिराचे बांधकाम व त्यावरील रंगीत शिखराचे काम ‘श्री रूपाभवानी भक्त मंडळ’ व ‘श्री वल्लभदास अग्रवाल’ यांच्या सहकार्याने झाले.
रुपाभवानी देवीला सुंदर पितळी मुखवटाही आहे. देवीच्या मंदिरात नवस फेडले जातात. विशेष म्हणजे मुस्लिम स्त्रीपुरुषही नवस फेडण्यासाठी आलेली दिसतात. सोलापूरात दुर्गामातेची तीन रुपे विशेष प्रसिद्ध आहेत. एक सोलापूर शहरातील रुपाभवानी, दुसरी माढ्याची माढेश्वरी देवी आणि तिसरी करमाळ्याची श्री कमला देवी.
सोलापूरचा भुईकोट
महाराष्ट्र, कर्नाटक आणि आंध्रप्रदेश (तेलंगणा) या तिन्ही राज्यांच्या सीमेवर वसलेले एक मिश्रभाषिक गाव म्हणजे सोलापूर. याच सोलापुरात एक अप्रतिम कलाकुसरीने नटलेला भुईकोट आहे. सोलापूरचा भुईकोट बहामनी राज्याचा प्रधान महमूद गवान याने साम्राज्य विस्तारासाठी (शके / इ.स.) १४६३ च्या सुमारास हा किल्ला बांधला.
पहाण्याची ठिकाणे :
सध्या शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या या किल्ल्यात पश्चिमाभिमुख प्रवेशद्वाराने आपण प्रवेश करतो, ती किल्ल्याची तटबंदी तोडून केलेली व्यवस्था आहे. मुख्य प्रवेशद्वार हे सध्याच्या सावरकर मैदानाच्या बाजूने आहे. किल्ल्यात मुख्य दरवाजाने प्रवेश करताना जुनी मोठी जाड साखळी आणि वीरगळ आपले स्वागत करतात. किल्ल्याला तीन बाजूनी खंदकाने वेढलेले आहे. चौथ्या बाजूला सिध्देश्वर मंदिर आणि तलाव आहे. त्याच खंदकावर बांधलेल्या आधुनिक पुलावरून आपण मुख्य प्रवेशद्वारापाशी पोहोचतो. किल्ल्यात प्रवेश करण्यापूर्वी पूल पार केल्यावर डाव्या बाजूला झाडाझुडपांत लपलेली नागबावडी आहे.
किल्ल्याचे पहिले प्रवेशद्वार म्हणजे हत्ती दरवाजा किंवा बाबा कादर दरवाजा हा गोमुखी बांधणीचा दरवाजा आजही सुस्थितीत आहे. लाकडी दरवाजावरील लोखंडी अणुकुचीदार खिळे, लोखंडी जाड पट्ट्या अजूनही शाबूत आहेत. सुरक्षिततेच्या दृष्टीने दरवाज्यावर तीन झरोक्यांची रचना केलेली आहे. दरवाजाच्या वर नगारखाना बांधलेला आहे. नगारखान्याच्या खालून किल्ल्यात प्रवेश केल्यावर पहारेकऱ्यांच्या खोल्या नजरेस पडतात. त्याच्या समोर घोड्याच्या पागा दिसतात. पहिल्या दरवाजाच्या पुढे दुसरा दरवाजा आहे. दोन्ही दरवाज्यांमध्ये युध्द मैदानासारखी मोठी जागा आहे. शत्रू आत आल्यास त्याला सर्व बाजूंनी घेरण्यासाठी या जागेचा उपयोग होतो. दुसरा दरवाजा हा शहर दरवाजा म्हणून ओळखला जातो. दरवाज्याच्या वरील दोन्ही खिडक्यांमध्ये जाण्यासाठी पायऱ्या आहेत. दरवाज्याच्या मधोमध कमानीच्या वर एक पर्शियन शिलालेख व त्याच्या बाजूला दोन शरभ शिल्प कोरलेली आहेत. या शिलालेखात विजापूरचा आदिलशाह, राजा सुलतान मोहम्मद, त्यांचे अधिकारी यांचा उल्लेख आढळतो. दरवाजा वरील खिडक्यांमधे शरभ आणि मृग शिल्प बसवलेले आहे. दुसऱ्या दरवाज्याच्या डाव्या बाजूच्या बुरुजावर अस्पष्ट असा देवनागरी लिपिमधील शिलालेख नजरेस पडतो. या दरवाज्याच्या आतील बाजूसही पहारेकऱ्यांच्या खोल्या दिसतात.
किल्ल्याच्या तिसऱ्या प्रवेशद्वाराशी लागूनच महाकाळ नावाने ओळखला जाणारा बुरुज आहे. बुरुजाच्या बांधकामाच्या वेळी हा बुरुज सतत ढासळत असल्याने बुरुज बांधताना मुंजा मुलाचा बळी देण्यात आला असे सांगतात. तसेच त्या मुंजा मुलाच्या घराण्याला (जोशी घराणे) तत्कालीन शासनाने १५ रु. वर्षासन चालू केले. बुरुजामध्येच मुंजोबाचे (महाकालेश्वर) आणि शनीश्वर मंदिर आहे. येथे महाकालेश्वराचा उत्सव जोशी कुटुंबीय चैत्र शुद्ध प्रतिपदेला आणि नृसिंह जयंतीला साजरा करतात. मंदिराच्या शेजारी एक गजशिल्प (एक दुसरे असेच शिल्प हुतात्मा बागेत घसरगुंडीच्या बाजूला आहे) आणि व्दारपालाचे शिल्प ठेवलेले आहे. याच प्रवेशद्वाराच्या वर फारसी लिपीतील (हिजरी ९८६; इ.स.१५७८-७९) शिलालेख आहे. या लेखात राजा अली आदिलशाह पहिला व त्याचा अधिकारी जाबीद खान याने मशीद, बाजारपेठ, बाग, हौद निर्माण केल्याचा उल्लेख आहे. या शिलालेखात सोलापूरचा उल्लेख संदलपूर असा आलेला आहे.
तिसऱ्या दरवाजाच्या आत पहारेकऱ्यांच्या खोलीमध्ये एक वीरगळ आहे. वीरगळीच्या बाजूस शिलालेख आहे. त्यात किल्ल्यातील विहिरीचा निर्मितीचा उल्लेख केलेला आहे. या दरवाजाच्या वरच्या बाजूस वीटांनी बांधलेली वास्तू आहे. या प्रवेशद्वाराच्या बाजूला उत्खननात सापडलेले श्री. कपिलसिध्द मल्लिकार्जुन मंदिर पाहावयास मिळते. १४ कोरीव खांब, बाह्य भिंतीवर व्यालशिल्पे, नागशिल्पे, विविध फुलांची शिल्पे तसेच कामशिल्पे असलेले हे मल्लिकार्जुन मंदिर आहे.
१८१९ साली उत्खननानंतर या मंदिराचे काही खांब वापरून शहराच्या बाळीवेस परिसरामध्ये नवीन मल्लिकार्जुन मंदिर बांधण्यात आले. किल्ल्यातले मंदिर श्री. शिवयोगी सिद्धरामेश्वर यांनी बांधल्याचा उल्लेख कवि राघवांक यांनी केलेला आहे. या मंदिराला देवगिरीचे यादव, कदंबराजे, व इतर सावकार यांचेकडून वतने, इनामे मिळाल्याचे उल्लेख आहेत. या मंदिराच्या उत्खननात सापडलेले दोन कन्नड शिलालेख व मोठे व्दारपाल मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज वस्तूसंग्रहलयात ठेवण्यात आलेले आहेत आणि देवीची मूर्ती चंदीगडच्या वस्तुसंग्रहालयात आहे.
मंदिराच्या डावीकडे काही अंतरावर एक वास्तू आहे. तिला ३२ खांब असल्याने ३२ खांबी मस्जिद म्हणले जाते. येथील कोरीव खांब, नक्षीयुक्त सजावटीने नटलेले आहेत. वास्तुमध्ये आत समोरून थंड हवा येण्यासाठी एक फट ठेवलेली पहावयास मिळते. वास्तूच्या आणि मंदिराच्या तिरक्या दिशेला किल्ल्यातील चौकोनी आकाराचा उंच बुरुज उठून दिसतो. बुरुजावर जाण्यासाठी पायऱ्या असून तोफ ठेवण्याची व्यवस्था केलेली दिसते. शेजारीच चौकोनी दोनही बाजूस पायऱ्या असलेली गोड्या पाण्याची विहीर आहे. परंतु झाडी वाढल्याने ती लवकर निदर्शनास येत नाही.
चौकोनी बुरुजाच्या दिशेने उजवीकडे बुरुजावरून चालत गेल्यास बुरुजावरच एक मोडी लिपीतील शिलालेख दिसतो. इ. स. १६८० चा काळ दर्शविणारा हा शिलालेख इकडील तटबंदी कच्ची होती, ती पक्की बांधून काढल्याचे सांगतो. इथूनच पुढे दर्गोपाटील बुरुज आहे. महाकालेश्वर बुरुजाप्रमाणे इथे दर्गोपाटील घराण्यातील बाळंतीणीला आत्मसमर्पण करावे लागले, तेव्हा हा बुरुज बांधून पूर्ण झाला. इथेही गुढी पाडव्याला उत्सव साजरा होतो. बुरुजावारच पद्मावती देवीचे मंदिर आहे.
दर्गोपाटील बुरुजाच्या (पद्मावती) पुढेच बाळंतीण विहीर दिसते. ही विहीर लांबट आयाताकर असून त्याच्या कडेला एक हवेशीर सज्जा आहे, आणि तिथूनच खाली उतरण्यासाठी पायऱ्याही आहेत. बाळंतीण विहिरीकडे जाताना बुरुजाच्या वरील बाजूस एक फारसी लिपीतील शिलालेख दिसतो. यामध्ये सुलातानासाठी सुखकारक, नयनरम्य महाल बांधल्याचा उल्लेख आहे.
बुरुजावरून सरळ चालत गेल्यावर एक हवेशीर बाल्कनी असलेला चौक लागतो. याच बाल्कनीच्या एका स्तंभावर देवनागरी लिपीतील शके १४६६ (इ. स . १५४४) च्या काळातील शिलालेख आहे. हा बुरुज बांधण्यासाठी दोन महिने लागले असा स्पष्ट उल्लेख यात आढळतो.
इथूनच पुढे निशाण बुरुज (हनुमान बुरुज) हा टेहेळणीच्या दृष्टीने महत्वाचा किल्ल्यातील सर्वात उंच बुरुज आहे. इथून सिद्धेश्वर मंदिराचा परिसर नजरेत सामावता येतो. बुरुजावर चढताना अनेक खंडीत शिल्पे पहावयास मिळतात.
या बुरुजावरून सरळ चालत आता जिथून प्रवेशद्वार आहे, तिथे पोहोचता येते. बुरुजावरून खाली उतरल्यावर ब्रिटीशकालीन वास्तू आहेत. तसेच शिखराचे भग्न अवशेष, स्तंभ मांडून ठेवलेले आहेत. आता जिथे उद्यान आहे त्याच्या मधोमध दोन ब्रिटिशांच्या मोहोर असलेल्या तोफा ठेवलेल्या आहेत. सध्याच्या प्रवेशद्वारातून बाहेर पडून डावीकडे आखाड्याच्या दिशेने आत गेल्यावर तटबंदीवर विविध प्रकारची शिल्पे पहावयास मिळतात. त्यात वीरगळ, विद्याधर पट, शिल्पपट आहेत असेच सरळ तटबंदीच्या कडेने चालत गेल्यास किल्ल्यातील एकमेव अशा अष्टकोनी बुरुजापाशी आपण येतो.
परत त्याच रस्त्याने मागे येऊन प्रवेशद्वारापाशी आल्यावर आपली किल्ल्याची प्रदक्षिणा पूर्ण होते.
किल्ला पुरातत्व खात्याच्या अखत्यारीत असल्याने ९ ते ५ अशी प्रवेशाची वेळ आहे. बाग मात्र ७ वाजेपर्यंत चालू असते. सोलापूर, नळादुर्ग, परांडा, माचणूर , करमाळा, मंगळवेढा हे भुईकोट दोन तीन दिवसात पाहाता येतात.
पोहोचण्याच्या वाटा :
सोलापूर शहर रस्ता आणि रेल्वे मार्गाने इतर भागाशी जोडलेले आहे. सोलापूर रेल्वे आणि बस स्थानकातून रिक्षाने किल्ल्याच्या प्रवेशव्दारापर्यंत जाता येते.
राहाण्याची सोय :
सोलापूर शहरात राहण्याची व्यवस्था उपलब्ध आहे.
पाण्याची सोय :
किल्ल्यात सध्या पाणी नसल्याने पाणी सोबत ठेवावे.
जाण्यासाठी लागणारा वेळ :
सोलापूर शहरात जेवणाची व्यवस्था उपलब्ध आहे.
जाण्यासाठी उत्तम कालावधी :
वर्षभर
Camping: Not allowed.
Nearby Tourist places: Shri Siddheshwar temple, Mahatma Gandhi Zoo .
Maintained By: ASI
Entry Fee: ₹ 15
Visiting hours: 9 AM to 5 PM
History: It was built from stones in the 14th century during Bahamani sultanate. It was later ruled by Marathas and Nizams. It was defended by layers of fortifications, a moat with 30 meter width surrounding the fort on the three sides and 23 bastions.
Solapur fort is a land fort in the city of Solapur. It is just beside Shri Siddheshwar temple. Since it is built on the land, unlike other forts in Maharashtra which are on mountains, this will be a simple walk and people of all ages can visit. There is a drinking water and toilet facility inside. The fort has been declared as monument of national importance by Archaeological survey of India (ASI).
महाराष्ट्र राज्यातील सोलापूर जिल्ह्याचे आणि उत्तर सोलापूर तालुक्याचे मुख्य ठिकाण. लोकसंख्या ९,५१,११८ (२०११). जिल्ह्याच्या पूर्व भागातील सीना नदीखोऱ्यात सस. पासून सुमारे ५४८ मी. उंचीवर हे शहर वसले आहे. ते पुण्यापासून आग्नेयीस सुमारे २४५ किमी., तर साताऱ्याच्या पूर्वेस सुमारे २२० किमी. अंतरावर आहे. हे शहर अवर्षणप्रवण क्षेत्रात येत असल्यामुळे येथील वार्षिक सरासरी पर्जन्यमान बरेच कमी म्हणजे केवळ ५४.५ सेंमी. आहे.

सोलापूर शहराला प्राचीन ऐतिहासिक वारसा लाभलेला आहे. इ. स. पू. २०० पासून सातवाहन, बादामीचे चालुक्य, राष्ट्रकूट, कल्याणीचे चालुक्य, देवगिरीचे यादव, बहमनी, निजामशाही, आदिलशाही, मराठे आणि शेवटी ब्रिटिश या विविध सत्तांनी सोलापूरवर राज्य केले. बहमनी सत्ता काळात चौदाव्या शतकात येथे सोलापूर किल्ला बांधण्यात आला. तेव्हापासून या शहराचे ऐतिहासिक महत्त्व वाढले. सोलापूर किल्ला हा भुईकोट किल्ल्याचा उत्कृष्ट नमुना आहे. २९२.६ मी. × १६०.९ मी. क्षेत्रात उभारलेल्या व साधारणत: चौकोनाकृती असलेल्या या किल्ल्याचे बांधकाम अतिशय मजबूत आहे. किल्ल्याभोवती दुहेरी तटबंदी व त्याभोवती सदोदित पाण्याने भरलेला खंदक होता. शेजारच्या तलावातील पाणी या खंदकात घेतले जाई. किल्ल्याच्या बाहेरील तटास चार बाजूंना चार मोठे बुरूज आणि त्यांमध्ये तेवीस बुरूज आहेत. दिंडी दरवाजाच्या आतील बाजूस मोठे बुरूजांचे संकुल आढळते. किल्ल्यातील तिसरा दरवाजा ओलांडून आत गेल्यानंतर २२८.६ मी. लांब व १२८.९ मी. रुंदीचे आवार दिसते. ग. ह. खरे यांच्या मते, या भागात इतिहासकाळामध्ये विविध हेतूंनी बांधल्या गेलेल्या लहान-मोठ्या सुमारे ३०० इमारती होत्या. आजही या भागात मंदिर, मशिदी, बुरूज इत्यादींचे अवशेष आढळतात. किल्ल्यामध्ये ठिकठिकाणी विविध शिल्पे आढळतात.

गिरणगाव म्हणून सुपरिचित असलेल्या सोलापूर शहराला वस्त्रोद्योगाची वैभवशाली परंपरा आहे. इ. स. १८५९ मध्ये येथपर्यंत लोहमार्ग आला, तेव्हापासून या उद्योगाला अधिकच चालना मिळाली. ‘सोलापूर स्पिनिंग ॲन्ड वीव्हिंग कंपनी’ने इ. स. १८७७ मध्ये येथील पहिली कापड गिरणी स्थापन केली. हातमाग, यंत्रमाग, सूतगिरण्या, कापडगिरण्या आणि वस्त्रोद्योगाशी निगडित विविध प्रक्रियाउद्योग येथे चालतात. येथील कोष्टी व पद्मशाली हे विणकर समाज हातमाग व्यवसायात आणि कलात्मक हस्तकौशल्यात पारंगत आहेत. येथील प्रामुख्याने उत्तम प्रतीच्या ‘जेकॉर्ड’ चादरी तसेच पलंगपोस, सतरंज्या, टॉवेल, नॅपकिन व सुती साड्या ही उत्पादने जगभरप्रसिद्ध आहेत. वस्त्रोद्योगातील उत्पादनांची मोठ्या प्रमाणावर परदेशी निर्यात केली जाते. उत्पादनातील विविधता, आकर्षक रंगसंगती, टिकाऊपणा आणि उपयुक्तता ही या उत्पादनांची वैशिष्ट्ये आहेत. येथील विडी उद्योग प्रसिद्ध असून विडी कामगारांसाठीची स्वतंत्र वसाहत आहे. लगतच्या औद्योगिक वसाहतीत विविध लघु तसेच अभियांत्रिकी उद्योग आहेत. सोलापूरची शेंगदाण्याची चटणी, शेंगदाण्याच्या पोळ्या व ज्वारीची कडक भाकरी सर्वदूर प्रसिद्ध आहे. कापूस व इतर कृषिमालाच्या बाजारपेठेचे हे प्रमुख केंद्र आहे. शहरात पुलगम टेक्सटाईलसारखी वस्त्रोत्पादनाची मोठी विक्री केंद्रे असून, सोलापूरात आलेले पर्यटक आवर्जून अशा विक्री केंद्रात मोठ्या प्रमाणावर खरेदी करताना आढळतात. पुणे-सोलापूर-हैदराबाद-विजयवाडा क्र. ९ आणि सोलापूर-विजापूर-चित्रदुर्ग क्र. १३ हे दोन राष्ट्रीय महामार्ग शहरातून जातात. मुंबई-चेन्नई व सोलापूर-विजापूर हे लोहमार्गही शहरातून जातात.

सोलापूर विद्यापीठ (स्था. २००४), दयानंद महाविद्यालय (स्था. १९४०) व संगमेश्वर महाविद्यालय (स्था. १९५३) या येथील प्रमुख शैक्षणिक संस्था आहेत. महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ व सोलापूर जिल्हा प्रशासन यांच्या संयुक्त विद्यमाने २००७ मध्ये येथे सोलापूर महोत्सव आयोजित केला होता. सोलापूर शहर हे बहुभाषिक असून येथे मराठी, हिंदी, कानडी, तेलुगू या भाषा बोलल्या जातात. १ मे १९६४ रोजी सोलापूरमध्ये महानगरपालिकेची स्थापना झाली.सिद्धेश्वर मंदिर-तलाव
पर्यटनाच्या दृष्टीने सोलापूरला विशेष महत्त्व आहे. वैभवशाली परंपरा असलेला येथील भुईकोट किल्ला हे पर्यटकांचे प्रमुख आकर्षण आहे. येथील सिद्धेश्वर मंदिर विशेष प्रसिद्ध असून, प्रतिवर्षी मार्गशीर्ष-पौष या महिन्यांदरम्यान येथे मोठी जत्रा भरते. त्याशिवाय येथील मल्लिकार्जुन मंदिर, जुने राम मंदिर, विठ्ठल मंदिर, रूपाभवानी, काळजापूर, आदिनाथ मंदिर, मारुती मंदिर, जैन मंदिर, सिद्धरामेश्वराची समाधी, शुभराय मठ, प्रॉटेस्टंट चर्च, द्वारकानाथ कोटणीस यांचे स्मारक इत्यादी उल्लेखनीय आहेत. सिद्धेश्वर तलाव, धर्मवीर संभाजी जलाशय (कंबर तलाव) व त्याचा निसर्गरम्य परिसर, स्मृती वन, हुतात्मा बाग, रेवणसिद्धेश्वर प्राणिसंग्रहालय, हिप्परण्याचा एकरूख तलाव ही येथील प्रमुख पर्यटनस्थळे आहेत. सोलापूर-विजापूर महामार्गावर, सोलापूरपासून ५ किमी. अंतरावर वनविभागाच्या वतीने १२५ हे. परिसरात विकसित केलेला सिद्धेश्वर वनविहार प्रकल्पसुद्धा पर्यटनाच्या दृष्टीने महत्त्वाचा आहे. सोलापूर शहरापासून जवळपास तुळजापूर (उस्मानाबाद जिल्हा), अक्कलकोट, विजापूर (कर्नाटक राज्य), नान्नज अभयारण्य इत्यादी धार्मिक व प्रेक्षणीय स्थळे असून ती पाहण्यासाठी बरेच पर्यटक सोलापुरात राहतात. त्यामुळे सोलापुरात तारांकित हॉटेलांपासून धर्मशाळेपर्यंत राहण्याच्या चांगल्या सुविधा आहेत.
मराठ्यांनी सोलापूर जिल्ह्यात अनेक ठिकाणी आक्रमण केले, सोलापूरचा भुईकोट किल्ला हे विजापूरकर आणी मुघल याच्यातील १६६८च्या
तहानुसार मुघलांना मिळाला होता या कालावधीत मोगलनी आपले तोफखाना व दारूगोळा व टाकसांळ सोलापूरच्या भुईकोट किल्ला सुरु केले १६८० मध्य खानजहान बहादूरच्या आज्ञेनुसार सोलापूरच्या भुईकोट किल्लातील २५तोफा दुसरीकडे नेण्याची जबाबदारी अली आगामी जगतसिंग हाडा आणि राजा जसवंतसिगं बुंदेला यांच्यावर सोपविण्यात आले होते.
या २५तोफा मराठ्यांनी हस्तगत केल्या. अली, जगतसिगं हाडा, व जसवतसिग यांच्यावर तोफा नेण्याच्या कामात दिरंगाई केली म्हणून मन्सब कमी करून त्यांच्या कडून नुकसान भरपाई घेण्यात आले।।
यावेळी सन १६८०च्या डिसेंबर महिन्यात संभाजीराजे जातीने सोलापूरजवळ गेले होते. त्याचा हेतू कदाचित मुलखाची पाहणी करण्याची असावा. रणमस्तखान व इतर मुघल अधिकारीनी त्याच्या बरोबर मुकाबला केला.त्यात छत्रपती संभाजी महाराज व मोगल व छत्रपती संभाजी महाराज यांच्या पक्षाचे लोक जखमी झाले…
⚔मराठा मुघल संघर्ष सोलापूर भुईकोट किल्ला छ.संभाजी कालखंड ⚔
१६८० च्या आँक्टोबर महिन्यात ज्या वेळी औरंगाबाद व पेडगावला फौजेची नेमणूक झाली त्याच वेळी संभाजी राजांना सोलापूर येथेही सैन्य धाडण्याची व्यवस्था केलेली होती.. त्यामुळे खानजहान बहादूरने आपला डेरा उठविली।।
ज्या वेळेस मुहम्मद आज्जमशहा औरंगाबाद च्या सुभ्यात पोचणार होता त्या वेळी खानजहान बहादूर मराठ्यांना तंबी देण्यासाठी कूच करणार होता..यावेळी मराठ्यांचा फौज सोलापूर किल्लाजवळ गेली.प्रचंड संघर्ष झाले.
नोव्हेंबरच्या अखेरील संभाजी राजानी ६०००स्वारांची फौज सोलापूर उद्ध्वस्त करण्यासाठी रवाना केली. ती सोलापूरला पोचताचा मोगल किल्लेदार राजा मनोहरदास गौड किल्लावरुन मराठ्यांचा मुकाबला करण्यासाठी निघाला, खानजहान बहादुदुरने रजबखानाला मनोहरदास गौडच्या मदतीसाठी पाठविले. मराठे व मुघल यांच्यात लढाई होऊन मराठ्यांचे बरेच लोक कामास आले…
१६८३च्या एप्रिल महिन्यात मनोहरदास गौडचा मुलगा किशोरदास याला सोलापचा किल्लेदार नेमण्यात आले , १६८५ च्या एप्रिल महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात छ. संभाजी महाराजांचे एक सरदार सुदजी सोलापूर तालुक्यात घुसला होता. व मुघलांना प्रचंड लुटला
तेव्हा औरंगजेब यांना शिरवळच्या अबु मह्हमुद ठाणेदारना रवाना करून लवकर जाऊन मराठ्यांचा सोलापूर येथे पराभव करण्यासाठी सांगितले..
ठाणेदार दि. २२/४/१६८५रोजी तेथे पोचला. मराठे व मोगली सैन्यात लढाई होऊन दोन्ही बाजूंनी अनेक जण मेले व जखमी झाले. यावेळेस मराठ्यांनी माघार घेतली मराठ्यांनी लुटलेल्या सामानपैकी ३१ घोडे आणि भाले मुघलांच्या हातात सापडले.
तसेच मराठ्याचे सरसेनापती हंबीरराव मोहित हे सोलापूर परिसरात याचा कालखंडात येऊन गेले असलेच नोंद सापडले.
चिकित्सा –सोलापूर भुईकोट किल्ला येथून मूघलचे तोफांखाना होते तसेच टाकसाळं पण याचा किल्लावर होते शिवाय महाराष्ट्र व कर्नाटक व आंध्र प्रदेश च्या सरहद वरील प्रमुख लष्कर ठाणे सोलापूर आहे येथून चौफार घोडदौड करण्यासाठी महत्त्वाचे ठिकाण आहे म्हणून छत्रपती संभाजी महाराज व मराठ्यांचा वावर सतत या परिसरात दिसुन येते
तसेच याचा प्रदेशातून मोगली सैन्यासाठी रसद व कामुक (धन्य साम्रगी) येत असल्याचे नोंदी उपलब्ध आहेत त्या मोगलांना भेट नयेत म्हणून याभागात मराठे सतत वावरातुन दिसतात
सुचना — सदर लेख बदल आणखी माहिती आपणाकडे असेल तर निश्चितच फोन करावेत व मार्गदर्शन करावेत
सोलापूर ते पंढरपूर, सोलापूर ते तुळजापूर सकाळी ६ ते रात्री ९. ३० पर्यंत दर अर्ध्यातासाला विनावाहक गाडी आहे.
अक्कलकोटला जायायला सकाळी ६ ते रात्री ८ पर्यंत दर १५ मिनिटाला गाडी आहे.
नळदुर्गला जायायला सकाळी ७. ३० ते संध्याकाळी १८. ३० पर्यंत दर तासाला गाडी आहे.
मुंबईला जायला वेळेत आणि नेमक्या एसटी आहेत.
पुण्याला जायला दर अर्धा ते पाऊण तासाला एक एसटी आहे. मात्र संध्यकाळी पाऊणे सहा नंतर तासाला एक गाडी आहे.
मंगळवेढा किल्ल्याला जायला सकाळी ६ ते संध्याकाळी ६ पर्यंत दर अर्ध्या तासाला एक गाडी आहे.
तसेच सांगोला- मंगळगड मार्गे गावी जाणारी एसटी हि असते.
सोलापूरी चादर खरेदी करायची असेल तर काही माहिती
माझी रात्री ९.३० ची मुंबई साठी ट्रेन होती. तोपर्यंत काय करणार, म्हणून मी सोलापूरी चादर घेण्यासाठी गेलो.
मी तेथील रिक्षावाला आणि हॉटेल वाल्याकडून माहिती काढून घेतली होती. इथे चादरीची प्रसिद्ध दुकान कुठची आहे. तर मला ३ नावे कळली. गांजी शोरूम, पुलगाम आणि चिल्का. त्यात जर तुम्ही जास्त नग मध्ये (२५/५० किंवा १००) घेणार असाल तर गांजीचा कारखाना MIDC भागात आहे तेथे जावे. तेथे अजून स्वस्तात भेटतात असे बोलतात. बहुतेक पुलगाम आणि चिल्का चा पण कारखाना आहे. पण नक्की कुठे ते मला माहित नाही. नाही तर गांजी, पुलगाम किंवा चिल्काच्या शोरूम मधून घ्यावा
भुईकोट किल्ला म्हणजे असा किल्ला जो उंच डोंगरावर बांधलेला नसून सपाट जमिनीवर बांधला गेला आहे. भुई म्हणजे जमीन आणि कोट म्हणजे किल्ला. छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातील बहुतेक किल्ले हे उंच डोंगरावर बांधले गेले आहेत.
परंतु काही किल्ले असेही आहेत जे सपाट जमिनीवर बांधले गेले आहेत. सद्यस्थितीत भुईकोट किल्ला हा सोलापुरातील जहागीरदार घराण्याचे निवासस्थान आहे.
सोलापूर शहरातील भुईकोट
किल्ल्याचा परिसर मोठा आहे. किल्ल्यात जाण्यासाठी पाच रुपयांचे तिकिट आहे. आतमध्ये बाग आहे, पण देखभाल होत नसल्याचे जाणवले. दोन पोलादी तोफा व एक माहिती देणारा दगडी फलक लावला आहे. आतमध्ये नमाजासाठी पडकी मशिद आढळली. ती अनेक खांबी आहे. पुढे छोटा हौद आहे. त्यात दगडी कलाकुसर हिंदु पद्धतीची आहे. आतमध्ये सभोवताली चिंच, बाभूळ, बदाम, कडुनिंब असे मोठमोठे वृक्ष आहेत. कारंजांच्या जागाही आहे, पण पाणी नसल्याने ते कोरडे आहेत!
सोलापूरचा किल्ला नक्की केव्हा बांधला याबद्दल मतभिन्नता आढळते.
कॅम्पबेल यांच्या मते बहामनी बादशहा महंमदशहा याने तो १३५८ ते १३७५ या दरम्यान बांधला असावा तर डॉ. हंटर यांच्या मते, तो १३४५ मध्ये बांधला असावा. तोरो यांच्या मताप्रमाणे, हसन गंगू बहामनी याने बाहेरील कोट १३१३ मध्ये तर आतील कोट हिंदू राजांनी बाराव्या शतकात बांधला आहे. सोलापूरचे मल्लिकार्जुन पाटील यांनी हा किल्ला इ.स. १४५६ साली बांधला असे मत नोंदवून ठेवले आहे. दुसरा महंमदशहा बहामनी ( १४६६ ते १४८२ ) यांचा हुशार दिवाण महमद गवान याने सोलापूर व परांडा हे दोन्ही समान बांधण असलेले किल्ले एकाचवेळी बांधले असावे, असे काहींचे मत आहे.
सोलापूरच्या भुईकोट किल्ल्यात हेमाडपंथी अवशेष आढळतात. त्या किल्ल्यात पूर्वी तीनशे घरे होती. उत्तरेच्या भिंतीत बुजलेले देऊळ आढळते. त्याचे उत्खनन १९१९ साली झाले व ते चालुक्य देवालय असल्याचे कळले. तेथे हिंदू स्थापत्यकलेची ओळख सांगणारी शिल्पे कोरलेली दिसतात.मुघल बादशहा औरंगजेब १६८५-८६ या काळात सुमारे वर्षभर या किल्ल्यावर राहिला होता. येथेच त्याच्या टांकसाळीतून चांदीची नाणी निर्माण झाल्याचे पुरावे आढळतात. ती नाणी कोलकता येथील म्युझियममध्ये आढळतात. १७९५ ते १८१८ या काळात हा किल्ला मराठ्यांच्या ताब्यात होता. दुसरा बाजीराव पेशवा यांचा निवास या किल्ल्यावर होता. इंग्रजांनी सोलापूरवर आक्रमण करून बाजीरावाचा पाडाव मे, १८१८ मध्ये केला.
बुलंद भुईकोट!
सोलापूरला जाऊन सिद्धेश्वर मंदिर आणि तिथला भुईकोट ही दोन स्थळे अवश्य
पाहायची. यातला सोलापूरचा भुईकोट म्हणजे तर दुर्गबांधणीतले एक बुलंद असे
रूप आहे. विजापूर, बेळगाव, मिरज, बिदर, नळदुर्ग, औसा, परंडा या
दुर्गशंृखलेतील हा एक जणू भक्कम बुरूजच आहे.
शहरात शिरल्याबरोबर मधोमध
वसलेला हा गड आपले लक्ष वेधून घेतो. दुहेरी तटबंदी, त्याभोवती खंदक आणि
खंदकानंतर पुन्हा तट, अशी चिलखती रचना असलेला हा एक भक्कम कोट! अशा या गडात
शिरण्यासाठी उत्तरेकडून मूळ मार्ग होता. मात्र आज तो बंद केल्याने
पश्चिमेकडील नव्या मार्गानेच गडात दाखल व्हावे लागते. पहिला तट, मग खंदक
आणि त्यानंतर ती दुहेरी तटबंदी ओलांडतच आत शिरायचे. आत शिरताना भुईकोटाच्या
या अजस्र रूपाचेच मनावर दडपण येत असते. ते मुस्लीम दुर्गस्थापत्यातील
भरभक्कम बुरूज, त्याच्यावरचे ते आक्रमक सज्जे, मारगिरीच्या जागा हे सारे
इतिहासकाळाचे दडपण वाढवते. आत गेल्या गेल्याच समोरच ब्रिटिशांच्या दोन
प्रचंड आकारांच्या तोफा आपले स्वागत करतात. या तोफा पाहातच ही बुलंद वास्तू
पाहण्यास सुरुवात करायची.
कोकणातून महाड मार्गे दक्षिणेत विजापूर,
बिदरच्या दिशेने येणाऱ्या राजमार्गावर सोलापूर हा इतिहासकाळापासून एक
महत्त्वाचा थांबा आहे. त्याच्या या महत्त्वामुळेच साधारणपणे चौदाव्या शतकात
बहमनी राजवटीत सोलापुरात ही बुलंद वास्तू आकारास आली. पुढे त्यात
आदिलशाही, निजामशाहीपासून ते थेट मराठय़ांपर्यंत अनेक राजवटींनी आपापल्या
गरजा-सोयीनुसार बदल केले. आदिलशाही आणि निजामशाहीच्या तर अगदी सरहद्दीवर हा
भुईकोट! यामुळेच या शाही फौजांमध्ये या गडावरूनच अनेकदा लढाया झाल्या.
शेवटी लढाईचे मैदान ठरणारा हा किल्लाच पुढे या दोन शाही राजवटींच्या
मनोमिलनाचे स्थळही ठरला! साठ वर्षांचा संघर्ष थांबवत इसवी सन १५२३मध्ये याच
किल्ल्यात निजामशाह आणि आदिलशाहमध्ये मैत्रीचा तह झाला. या तहात आदिलशाहने
आपली मुलगी मरिअमचा विवाह बुऱ्हाण निजामशाहशी लावला. पुढे १५५२मध्ये
पुन्हा निजामशाहची कन्या चांदबिवी हिचा विवाह अली आदिलशाहबरोबर, तर
आदिलशाहची कन्या हादिया सुलताना हिचा विवाह मूर्तझा निजामशाहबरोबर याच
किल्ल्यात झाला. या शाही विवाहांनी तेव्हा हा किल्ला गाजला होता. पुढे
दक्षिण मोहिमेवर आलेल्या औरंगजेबानेही हा किल्ला घेत काही काळ इथे मुक्काम
ठोकला होता. यानंतर यथावकाश मराठय़ांचेही या किल्ल्यावर वर्चस्व प्रस्थापित
झाले आणि शेवटी याच किल्ल्याने १४ जून १८१८ रोजी मराठेशाहीचा शेवटही
पाहिला! गतकाळातील हा सारा घटना-घडामोडींचा इतिहास लक्षात घेतला, की हे
तटबुरूजही आपल्याला सहाशे वर्षे मागे घेऊन जातात आणि मग या चिऱ्यांनाही एक
अर्थ प्राप्त होतो.
या गडदर्शनासाठी आतील बाजूने चालत अगदी प्रथम
उत्तरेकडील दरवाजात हजर व्हावे. आज हा मार्ग जरी बंद झालेला असला तरी
दुर्गदर्शनासाठी इथूनच सुरुवात करावी. या दरवाजाच्या पुढय़ात असलेल्या
खंदकावर आता काही वर्षांपर्यंत एक लाकडी काढघालीचा पूल होता. या पुलावरून
या पहिल्या दरवाजात पूर्वी यावे लागे. या दरवाजातूनच आत शिरताना एक मोठा
साखळदंड आणि दोन मीटर व्यासाची मोठी गोल कडी दिसते. या पहिल्या दरवाजाच्या
अंगावर जागोजागी पोलादी खिळे ठोकलेले असल्याने या दरवाजाला ‘खिळा दरवाजा’
असे म्हणतात. काही वर्षांपर्यंत याच दरवाजातून गडात प्रवेश व्हायचा, पण आता
हा दरवाजा बंद केलेला आहे. गोमुखी रचना, भोवताली आक्रमक बुरूज आणि आत
शिरण्यासाठी मोठय़ा दरवाजाला दिंडी ठेवलेली! असा हा दरवाजा इसवी सन १८१०
मध्ये दुरुस्त केल्याचा उल्लेख असलेला एक पितळी लेख या दरवाजावर होता अशी
नोंद आहे. पण सध्या तो दिसत नाही. या दरवाजाच्या बाहेरील बाजूस नागबावडी
नावाची एक भलीमोठी बारव आहे.
या दरवाजातून आत आलो, की एकापाठी एक दोन
दरवाजे लागतात. त्यांची बांधणी- शैली बऱ्यापैकी सारखी आहे. पैकी मधल्याचे
नाव ‘शहर’ किंवा ‘मधला दरवाजा’ तर त्यानंतरच्या महाकाली देवालयाजवळचा
महाकाली दरवाजा! या दोन्ही दरवाजांवर मनोऱ्यांचे तोरण आहे. तटबंदीवरच्या
पाकळय़ांच्या कमानी, बुरुजांवर बाहेर आलेले सज्जे आणि दरवाजावरचे हे मनोरे
हे सारे मुस्लीम स्थापत्याचे खास वैशिष्टय़! या दोन्ही दरवाजांवर शरभांची
शिल्पे बसवलेली आहेत. वाघ आणि घोडा किंवा बैल यांचे मिश्रण असलेला हा
काल्पनिक पशू! या शरभाच्या जोडीच्या मधोमध दोन्ही दरवाजांवर फारसी लिपीतील
शिलालेखही आहेत. या शिलालेखांनुसार हे दरवाजे अली आदिलशाह दुसरा याने
बांधले आहेत. तिसऱ्या दरवाजातून आत जाताच देवडीवर आणखी एक फारसी शिलालेख
दिसतो. गडावर असे एकूण दहा शिलालेख असून त्यापैकी सहा फारसी, तीन देवनागरी,
तर एक मोडी लिपीत आहे. तीन दरवाजांच्या या मालिकेदरम्यान चौकीच्या देवडय़ा,
दारूगोळय़ांची कोठारे आहेत. शिबंदीची घरे, विहिरी-आडही जागोजागी दिसतात.
दुसऱ्या दरवाजाशेजारील बुरुजावरच ढालकाठीची रचना आहे.
तिसऱ्या
दरवाजानंतर आपण पुन्हा गडात येतो. आतमध्ये भलेमोठे पटांगण आहे. या जागेवर
कधीकाळी तीनशेहून अधिक इमारती असल्याची नोंद आहे. पण सध्या यापैकी
मल्लिकार्जुन मंदिर, बत्तीस खांबांची एक प्राचीन इमारत आणि काही धान्य व
दारूगोळय़ाची कोठारे एवढय़ाच वास्तू दिसतात. यापैकी आपले लक्ष स्थिरावते ते
डाव्या हाताच्या मल्लिकार्जुन मंदिरावर! नक्षत्राकृती भूमीज पद्धतीचे हे
मंदिर आज उद्ध्वस्त रूपातच समोर येते. पण त्याच्या उपलब्ध अवशेषांवरून
मंदिराची एकेकाळची भव्यता आणि कोरीव श्रीमंती स्पष्ट होते. आज शिल्लक
असलेल्या तळाच्या अवशेषांवर व्याल व अन्य प्राण्यांचे थर, विविध भौमितिक
रचना आणि काही मैथुन शिल्पे दिसतात. हेमाडपंती शैलीतील हे मंदिर बाराव्या
शतकात येथील योगी सिद्धरामेश्वरांनी बांधल्याचे सांगितले जाते.
या
मंदिराशेजारीच बत्तीस खांबांची एक ऐतिहासिक इमारत आहे. या स्तंभांवरील
कोरीव काम, त्यावरील विषय, शैली पाहता हे खांब मूळ मल्लिकार्जुन मंदिराचेच
असल्याचे वाटते. या इमारतीचा तत्कालीन उपयोग लक्षात येत नाही. पण पुढे
धान्याचे कोठार आणि ब्रिटिशांच्या काळात दारूचे कोठार म्हणून उपयोग
झाल्याची नोंद आहे.
गडातील या दोन महत्त्वाच्या वास्तू पाहात पूर्व
तटावर आलो, की गडाला या बाजूने वेढा घातलेला सिद्धेश्वर तलाव त्याचे अथांग
रूप घेऊन आपल्यापुढे प्रगटतो. एवढा वेळ एखादा बुलंद भुईकोट वाटणारा हा
किल्ला या दर्शनानंतर एकदम जलदुर्गच वाटू लागतो. तलावाच्या या पाण्यातच उभी
राहिलेली या बाजूची तटबंदी, भोवतीचे पाणी, त्यातली छोटी बेटे,
सिद्धरामेश्वराचे मंदिर, नारळाची झाडे हा सारा देखावा मनाला भावतो.
सोलापुरात असतानाही कुठेतरी कोकणात असल्यासारखे वाटते. हा देखावा पाहातच
तटावरून गडप्रदक्षिणा सुरू होते. वाटेत बाळंतिणीची विहीर लागते. पुढे एक
सज्जा असलेली खोली आणि त्याच्या पुढय़ातील तलाव दिसतो. वाटेत दुहेरी
तटबंदीतील मोठमोठे बुरूज धडकी भरवत असतात. यापैकी काहींची हनुमान, निशाण,
महाकाली, दर्गोपाटील अशी नावेही समजतात. या तटावर जागोजागी हिंदू शिल्पेही
दिसतात. ही शिल्पेदेखील मूळची मल्लिकार्जुन मंदिराची वाटतात. दोन-तीन
तासांत हा कोट पाहून होतो आणि आपण पुन्हा त्या तोफांच्या सलामीसाठी हजर
होतो.
गडाचे हे भलेमोठे आवार आता काही वर्षांपर्यंत एक खिंडार होते. पण
येथील महापालिकेने यात लक्ष घातले आणि हा सारा परिसर साफसूफ होऊन तेथे आता
एक उत्तम उद्यान फुलवलेले आहे. सुपारीची उंच गेलेली झाडे, अन्य वृक्ष-वेली,
फुलझाडे आणि गवताचे पट्टे, नाचणारी कारंजी, फिरण्यासाठी बांधीव पायवाटा,
बसण्यासाठी ओटे, दिवाबत्तीची सोय असे हे सारेच दृश्य धक्के देत असते.
महाराष्ट्रात अनेक गावा-शहरांच्या सान्निध्यात असे भुईकोट, गढय़ा किंवा अन्य
ऐतिहासिक वास्तू आहेत. परंतु इतिहासाबद्दलची अनास्था आणि राजकीय
उदासीनतेमुळे गावोगावचे हे वैभव आता दगड-मातीची खिंडारे आणि घाण-कचऱ्याचे
उकिरडे बनलेले आहेत. या साऱ्या पाश्र्वभूमीवर सोलापूरच्या या बुलंद
भुईकोटाचे हे दृश्य मनात नवा आशावाद निर्माण करणारे वाटले.
भुईकोट किल्ल्यात आदिलशहाच्या काळात साकारलेली तिसरी विहीर झाली खुली !ऐतिहासिक भुईकोट किल्ल्यात आदिलशहाच्या काळात तयार झालेली विहीर काटेरी झुडपांमध्ये दडली होती. ही विहीर आता पाहण्यासाठी मोकळी झाली. बांधकामाचा
उत्कृष्ट नमुना असलेल्या या विहिरीचे संवर्धन करण्याची आवश्यकता असल्याचे केंद्र शासनाच्या निधीतून भुईकोट किल्ल्याच्या संवर्धनाचे प्रयत्न सुरू आहेत. किल्ल्यातील काटेरी झुडपे हटविण्यात आली. सोलापुरातील सामाजिक संघटनांनी यासाठी आठवड्यातून एकदा श्रमदान केले. राज्याच्या विविध भागातील शिवप्रेमी
यात सहभागी झाले. झाडीझुडपे हटविण्यासाठी बरेच श्रम करावे लागले. पुरातत्त्व विभागाचे कर्मचारी झटले. अद्याप बरेच काम बाकी असले तरी या
मोहिमेतून काही चांगल्या गोष्टी घडत आहेत.भुईकोट किल्ल्यात अनेक ऐतिहासिक वास्तू आहेत. दस्तावेजात त्याची नोंद आहे. काटेरी झुडपांमुळे आणि पडझड झाल्यामुळे त्या झाकोळल्या गेल्या आहेत. नव्या स्वच्छता अभियानामुळे अशा अनेक वास्तू इतिहासप्रेमींना पाहण्यासाठी खुल्या होत आहेत. त्यापैकीच एक म्हणून तिसºया विहिरीकडे पाहता येईल.भुईकोट किल्ल्यात एकूणच चार विहिरी आहेत. बाळंतीण आणि नागबावडी या दोन विहिरी खुल्या आहेत. मल्लिकार्जुन मंदिरासमोर तिसरी विहीर असल्याचे सांगितले जायचे. मात्र लोकांना तिथे पोहोचता येत नव्हते.स्वच्छता अभियानामुळे ही विहीर खुली झाली आहे. भोवताली बरीच स्वच्छता करून घेण्यात आली आहे. अभ्यासकांच्या नजरेतून या विहिरीचे वैशिष्ट्य इतिहास अभ्यासक नितीन अणवेकर म्हणाले, तिसरी विहीर ही गोड्या पाण्याची विहीर म्हणून ओळखली जाते. विहिरीत पाण्यापर्यंत जाण्यासाठी दोन मार्ग (सोपान) आहेत. ही विहीर चौकोनी आकाराची असून, बरीच खोल आहे. विहिरीच्या भोवती कठडा नाही. मल्लिकार्जुन मंदिराच्या समोरील बाजूस असणारी ही विहीर विजापूरच्या आदिलशहाच्या काळात १६५३ साली तयार झाली आहे. विहिरीवर एक शिलालेख होता. त्यावरही याबाबतची नोंद आहे. किल्ल्यात जलव्यवस्थापनाचे अत्यंत महत्त्वाचे स्थान असते. किल्ला बांधताना पाणीपुरवठ्याची सोय व्हावी म्हणून किल्ल्यातच विहीर आणि बारवाचे बांधकाम केले जात असे. बाळंतीण विहिरीतून खापरी पन्हाळीद्वारे किल्ल्यात जागोजागी पाणीपुरवठा होत होता. मध्ययुगीन काळात आधुनिक पुलाच्या बाजूला नागबावडी ही
विहीर झाली. गोड्या पाण्याची विहीर पाहण्यासाठी खुली होणे खूप महत्त्वाचे आहे. आता या विहिरीचे संवर्धन होणे आवश्यक आहे.
-नितीन अणवेकर, इतिहास अभ्यासक
अनेक सत्ताधीशांना साथ देणारा सोलापूरचा भुईकोट
| महाराष्ट्र, कर्नाटक आणि आंध्रप्रदेश (तेलंगणा) या तिन्ही राज्यांच्या सीमेवर वसलेले एक मिश्रभाषिक गाव म्हणजे सोलापूर. याच सोलापुरात एक अप्रतिम कलाकुसरीने नटलेला भुईकोट आहे. सोलापूरचा भुईकोट बहामनी राज्याचा प्रधान महमूद गवान याने साम्राज्य विस्तारासाठी हा किल्ला बांधला. | |||||||||||||||||
| सध्या शहराच्या
मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या या किल्ल्यात पश्चिमाभिमुख प्रवेशद्वाराने आपण
प्रवेश करतो, ती किल्ल्याची तटबंदी तोडून केलेली व्यवस्था आहे. मुख्य
प्रवेशद्वार हे सध्याच्या सावरकर मैदानाच्या बाजूने आहे. किल्ल्यात मुख्य
दरवाजाने प्रवेश करताना जुनी मोठी जाड साखळी आणि वीरगळ आपले स्वागत करतात.
किल्ल्याला तीन बाजूनी खंदकाने वेढलेले आहे. चौथ्या बाजूला सिध्देश्वर
मंदिर आणि तलाव आहे. त्याच खंदकावर बांधलेल्या आधुनिक पुलावरून आपण मुख्य
प्रवेशद्वारापाशी पोहोचतो. किल्ल्यात प्रवेश करण्यापूर्वी पूल पार केल्यावर
डाव्या बाजूला झाडाझुडपांत लपलेली नागबावडी आहे. किल्ल्याचे पहिले प्रवेशद्वार म्हणजे हत्ती दरवाजा किंवा बाबा कादर दरवाजा हा गोमुखी बांधणीचा दरवाजा आजही सुस्थितीत आहे. लाकडी दरवाजावरील लोखंडी अणुकुचीदार खिळे, लोखंडी जाड पट्ट्या अजूनही शाबूत आहेत. सुरक्षिततेच्या दृष्टीने दरवाज्यावर तीन झरोक्यांची रचना केलेली आहे. दरवाजाच्या वर नगारखाना बांधलेला आहे. नगारखान्याच्या खालून किल्ल्यात प्रवेश केल्यावर पहारेकऱ्यांच्या खोल्या नजरेस पडतात. त्याच्या समोर घोड्याच्या पागा दिसतात. पहिल्या दरवाजाच्या पुढे दुसरा दरवाजा आहे. दोन्ही दरवाज्यांमध्ये युध्द मैदानासारखी मोठी जागा आहे. शत्रू आत आल्यास त्याला सर्व बाजूंनी घेरण्यासाठी या जागेचा उपयोग होतो. दुसरा दरवाजा हा शहर दरवाजा म्हणून ओळखला जातो. दरवाज्याच्या वरील दोन्ही खिडक्यांमध्ये जाण्यासाठी पायऱ्या आहेत. दरवाज्याच्या मधोमध कमानीच्या वर एक पर्शियन शिलालेख व त्याच्या बाजूला दोन शरभ शिल्प कोरलेली आहेत. या शिलालेखात विजापूरचा आदिलशाह, राजा सुलतान मोहम्मद, त्यांचे अधिकारी यांचा उल्लेख आढळतो. दरवाजा वरील खिडक्यांमधे शरभ आणि मृग शिल्प बसवलेले आहे. दुसऱ्या दरवाज्याच्या डाव्या बाजूच्या बुरुजावर अस्पष्ट असा देवनागरी लिपिमधील शिलालेख नजरेस पडतो. या दरवाज्याच्या आतील बाजूसही पहारेकऱ्यांच्या खोल्या दिसतात. किल्ल्याच्या तिसऱ्या प्रवेशद्वाराशी लागूनच महाकाळ नावाने ओळखला जाणारा बुरुज आहे. बुरुजाच्या बांधकामाच्या वेळी हा बुरुज सतत ढासळत असल्याने बुरुज बांधताना मुंजा मुलाचा बळी देण्यात आला असे सांगतात. तसेच त्या मुंजा मुलाच्या घराण्याला (जोशी घराणे) तत्कालीन शासनाने १५ रु. वर्षासन चालू केले. बुरुजामध्येच मुंजोबाचे (महाकालेश्वर) आणि शनीश्वर मंदिर आहे. येथे महाकालेश्वराचा उत्सव जोशी कुटुंबीय चैत्र शुद्ध प्रतिपदेला आणि नृसिंह जयंतीला साजरा करतात. मंदिराच्या शेजारी एक गजशिल्प (एक दुसरे असेच शिल्प हुतात्मा बागेत घसरगुंडीच्या बाजूला आहे) आणि व्दारपालाचे शिल्प ठेवलेले आहे. याच प्रवेशद्वाराच्या वर फारसी लिपीतील (हिजरी ९८६; इ.स.१५७८-७९) शिलालेख आहे. या लेखात राजा अली आदिलशाह पहिला व त्याचा अधिकारी जाबीद खान याने मशीद, बाजारपेठ, बाग, हौद निर्माण केल्याचा उल्लेख आहे. या शिलालेखात सोलापूरचा उल्लेख संदलपूर असा आलेला आहे. तिसऱ्या दरवाजाच्या आत पहारेकऱ्यांच्या खोलीमध्ये एक वीरगळ आहे. वीरगळीच्या बाजूस शिलालेख आहे. त्यात किल्ल्यातील विहिरीचा निर्मितीचा उल्लेख केलेला आहे. या दरवाजाच्या वरच्या बाजूस वीटांनी बांधलेली वास्तू आहे. या प्रवेशद्वाराच्या बाजूला उत्खननात सापडलेले श्री. कपिलसिध्द मल्लिकार्जुन मंदिर पाहावयास मिळते. १४ कोरीव खांब, बाह्य भिंतीवर व्यालशिल्पे, नागशिल्पे, विविध फुलांची शिल्पे तसेच कामशिल्पे असलेले हे मल्लिकार्जुन मंदिर आहे. १८१९ साली उत्खननानंतर या मंदिराचे काही खांब वापरून शहराच्या बाळीवेस परिसरामध्ये नवीन मल्लिकार्जुन मंदिर बांधण्यात आले. किल्ल्यातले मंदिर श्री. शिवयोगी सिद्धरामेश्वर यांनी बांधल्याचा उल्लेख कवि राघवांक यांनी केलेला आहे. या मंदिराला देवगिरीचे यादव, कदंबराजे, व इतर सावकार यांचेकडून वतने, इनामे मिळाल्याचे उल्लेख आहेत. या मंदिराच्या उत्खननात सापडलेले दोन कन्नड शिलालेख व मोठे व्दारपाल मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज वस्तूसंग्रहलयात ठेवण्यात आलेले आहेत आणि देवीची मूर्ती चंदीगडच्या वस्तुसंग्रहालयात आहे. मंदिराच्या डावीकडे काही अंतरावर एक वास्तू आहे. तिला ३२ खांब असल्याने ३२ खांबी मस्जिद म्हणले जाते. येथील कोरीव खांब, नक्षीयुक्त सजावटीने नटलेले आहेत. वास्तुमध्ये आत समोरून थंड हवा येण्यासाठी एक फट ठेवलेली पहावयास मिळते. वास्तूच्या आणि मंदिराच्या तिरक्या दिशेला किल्ल्यातील चौकोनी आकाराचा उंच बुरुज उठून दिसतो. बुरुजावर जाण्यासाठी पायऱ्या असून तोफ ठेवण्याची व्यवस्था केलेली दिसते. शेजारीच चौकोनी दोनही बाजूस पायऱ्या असलेली गोड्या पाण्याची विहीर आहे. परंतु झाडी वाढल्याने ती लवकर निदर्शनास येत नाही. चौकोनी बुरुजाच्या दिशेने उजवीकडे बुरुजावरून चालत गेल्यास बुरुजावरच एक मोडी लिपीतील शिलालेख दिसतो. इ. स. १६८० चा काळ दर्शविणारा हा शिलालेख इकडील तटबंदी कच्ची होती, ती पक्की बांधून काढल्याचे सांगतो. इथूनच पुढे दर्गोपाटील बुरुज आहे. महाकालेश्वर बुरुजाप्रमाणे इथे दर्गोपाटील घराण्यातील बाळंतीणीला आत्मसमर्पण करावे लागले, तेव्हा हा बुरुज बांधून पूर्ण झाला. इथेही गुढी पाडव्याला उत्सव साजरा होतो. बुरुजावारच पद्मावती देवीचे मंदिर आहे. दर्गोपाटील बुरुजाच्या (पद्मावती) पुढेच बाळंतीण विहीर दिसते. ही विहीर लांबट आयाताकर असून त्याच्या कडेला एक हवेशीर सज्जा आहे, आणि तिथूनच खाली उतरण्यासाठी पायऱ्याही आहेत. बाळंतीण विहिरीकडे जाताना बुरुजाच्या वरील बाजूस एक फारसी लिपीतील शिलालेख दिसतो. यामध्ये सुलातानासाठी सुखकारक, नयनरम्य महाल बांधल्याचा उल्लेख आहे. बुरुजावरून सरळ चालत गेल्यावर एक हवेशीर बाल्कनी असलेला चौक लागतो. याच बाल्कनीच्या एका स्तंभावर देवनागरी लिपीतील शके १४६६ (इ. स . १५४४) च्या काळातील शिलालेख आहे. हा बुरुज बांधण्यासाठी दोन महिने लागले असा स्पष्ट उल्लेख यात आढळतो. इथूनच पुढे निशाण बुरुज (हनुमान बुरुज) हा टेहेळणीच्या दृष्टीने महत्वाचा किल्ल्यातील सर्वात उंच बुरुज आहे. इथून सिद्धेश्वर मंदिराचा परिसर नजरेत सामावता येतो. बुरुजावर चढताना अनेक खंडीत शिल्पे पहावयास मिळतात. या बुरुजावरून सरळ चालत आता जिथून प्रवेशद्वार आहे, तिथे पोहोचता येते. बुरुजावरून खाली उतरल्यावर ब्रिटीशकालीन वास्तू आहेत. तसेच शिखराचे भग्न अवशेष, स्तंभ मांडून ठेवलेले आहेत. आता जिथे उद्यान आहे त्याच्या मधोमध दोन ब्रिटिशांच्या मोहोर असलेल्या तोफा ठेवलेल्या आहेत. सध्याच्या प्रवेशद्वारातून बाहेर पडून डावीकडे आखाड्याच्या दिशेने आत गेल्यावर तटबंदीवर विविध प्रकारची शिल्पे पहावयास मिळतात. त्यात वीरगळ, विद्याधर पट, शिल्पपट आहेत असेच सरळ तटबंदीच्या कडेने चालत गेल्यास किल्ल्यातील एकमेव अशा अष्टकोनी बुरुजापाशी आपण येतो. परत त्याच रस्त्याने मागे येऊन प्रवेशद्वारापाशी आल्यावर आपली किल्ल्याची प्रदक्षिणा पूर्ण होते. किल्ला पुरातत्व खात्याच्या अखत्यारीत असल्याने ९ ते ५ अशी प्रवेशाची वेळ आहे. बाग मात्र ७ वाजेपर्यंत चालू असते. सोलापूर, नळादुर्ग, परांडा, माचणूर , करमाळा, मंगळवेढा हे भुईकोट दोन तीन दिवसात पाहाता येतात. | |||||||||||||||||
Solapur in a day | Part 3 | Bhuikot aka Solapur Fort
| Bhuikot Fort in the backdrop can be seen from Siddeshwar Temple |
| External wall of the Solapur Fort |
| One of the bastion as seen from outside |
A small walk of 5 minutes we were at the gates of the Bhuikot. There was this ticket counter of ASI , we paid Rs 25 per person and entered the Fort Complex.
| Entrance point with the ASI office |
| Cannons pointing toward the entrance door |
The Cannons are well polished and you have the year of manufacturing on them, Monogram of the rulers.
| Year of manufacturing carved on the cannons |
| Monogram of the Rulers on the cannon |
| We climbed these stairs to reach the flag post platform. |
Grass has grown at most of the places hence the watchman told us to be careful of the creepy reptiles.We smiled and nodded and went on our way.The outer side of the fort walls had lots of shrubs grown but the inside portion was easily walk-able.
![]() |
| Way towards the Flag post (PC: Dr Neha Mehta) |
| Siddeshwar temple as see from Solapur Fort |
We spent some time here enjoying the breeze, absorbing the beauty around us and of course clicking lots of pictures
| Today we realised what does the term leaping in joy meant |
| Bola tha na... ki Hum nahi sudherenge 😆😆 |
| 32 Pillar Mosque |
This masjid is on left side near the back end of the fort. Its an old masjid with 32 pillars. Basically its in ruins, Not maintained at all.
| Low roof supported by the pillars |
Moving inside the masjid you realise that the roof is quite low and the pillars standing are all more identical in shape.
| Identical Pillars |
We spent some time here and moved towards the Shiv Temple which is next to this masjid.
The structure is in complete ruins. Had it not being for the shivling at the lower base, Its difficult to make out that this structure was a temple.
| Ruins of shiv temple |
The brown grill that you are seeing in the picture above, the shivling is place below that and we could see fresh flowers on it which meant that its used for worshiping.
| Shivling with fresh flowers |
| Please note the design of pillars |
History often leaves so many questions open.I would like to have your views in comment column what is your take on this.
From here on we moved towards the teen Darwaza which the ASI guy at the ticket counter reminded us not to miss. Actually the entrance of the fort in ancient times were from these Darwazas or Gates. But ASI had changed the entrance from the road side.
| Main Gate of the Fort |
The Entry gate of the fort is quite formidable, two bastion like pillars with a windows along top is something typical of the architectural designs of those times.
This was the last site that we visited at the Bhuikot or Solapur fort. Generally one hours is enough to explore this fort but it took nearly 2 hours for us.( too much time spent on photos and masti) We were now quite hungry hence we planned to sit in the lawn of the fort and munch some biscuits and chips before moving on to our next destination Naldurg Fort.
To read about our journey from the beginning click here
Thursday, September 20, 2018
Solapur in a day| Part 2 | Siddeshwar temple
In our first part of the blog we visited Solapur Municipal Building (click here to read part one) and a little walk of 100 metres and we were at Siddeshwar Temple.
Siddeshwar temple is in Solapur District and is very sacred to hindus and the members of Lingayat faith. This temple is surrounded by a lake which is actually full of algae and overgrown grass.
| Fort or Temple !! |
| Festival of colours |
| Explosion of Colours |
| Bhuikot at the far end can be seen from Temple |
| Ek Salaam Ganpatiji ke naam |
| First look of the temple from the main entry gate |
| People chanting |
![]() |
| Temple top |
![]() |
| Beautiful Temple top |
![]() |
| Shivyogi shiddharameshwar idol |
Solapur in a day | Part 1 | Solapur Municipal Building
We slog through out the week at workplace and then comes the magical friday night. People with sane mind think of chilling out with friends over a glass of wine or beer, enjoy a good Sunday sleep Aur idhar hum Awara Ghumakad friday night yeh sapna dekhte hai ki yeh weekend kon sa saher ya konsa killa fathe karenge. Honestly speaking my whole week passes away like a breeze when I know I am going to explore a new place on the weekend.
This weekend I had planned to visit Siddeshwar temple, Bhuikot Fort aka Solapur Fort and Naldurg Fort.
This time I was lucky that I don't have to go solo because I had a wonderful company of my usual suspect kind of friends 😜 Nikhil and Pooja.
![]() |
| Train ke intezar ka apna hi maja hai |
| Liked the pole at a traffic circle |
| Beautiful Solapur Municipal Building |
Ab samaj me aaya , mai kyo chal kar explore karne me believe karta hu. Had we been travelling in any auto we could have easily missed out on this pretty building.
The architecture of the building is very artistic. The colourful windows and arches makes it a photographers delight.
| Beautifully designed windows |
There was a statue of a person in front of the main entrance hence out of curiosity I went ahead and read the name of the person. Well the name embbed on the statue was Rao Bahadur Mallappa Alias Appasaheb Warad. For me it was unknown name so I spoke to one of the person working there and the information that he gave me was amazing.The information so collected from the local and my research put together showed the various aspect of this person.
| Rao Bahadur Mallappa Alias Appasaheb Warad |
Life of Rao Bahadur Mallappa:
Rao Bahadur Mallappa Alias Appasaheb Warad can be regarded as one of the makers of the Sholapur City. He was born on 18th June,1851 in a Lingayat family at Sholapur. He had no formal education and no knowledge of English,yet his thinking, his vision, his mature understanding of the ways of the world placed him among the then prominent leaders of the city. He was a reformist in agricultural techniques.A special quality of groundnut cultivated by him was popularly known as "Warad Shengdana"
| Sculptures on the building |
He was thick with eminent personalities of his time like Justice M.G.Telang, Justice M.G.Ranade, Lokmanya Tilak. His discussions with Lokmanya Tilak resulted in a kind of co-operative scheme for the weavers community of Sholapur. But the government did not approve it. He was more an institution than an individual.
| Sculptures on the building |
| Some interesting arches and statues |
| Ornate Viewing area on terrace |
| Breathtaking view |
कपिलसिद्ध मल्लिकार्जुन मंदिराला जिर्णोद्धाराची प्रतीक्षा
सोलापूर : श्री सिद्धरामेश्वर महाराजांचे आराध्य दैवत श्री कपिलसिद्ध मल्लिकार्जुनाचे प्राचीन भग्नावस्थेतील मंदिर भुईकोट किल्ल्यात आहे. हा किल्ला पुरातत्व खात्याच्या ताब्यात आहे. कुडल संगम येथील मंदिराप्रमाणे याही मंदिराचा पुरातत्त्वशास्त्रीय पद्धतीने जिर्णोद्धार झाल्यास भाविक व पर्याटकासाठी ते आकर्षण ठरणार आहे.
श्री सिद्धरामेश्वरांनी सोलापूर हे ‘अभिनव श्रीशैल ‘ म्हणून त्याकाळी प्रसिद्धीस आणले. श्रीशैल यात्रा करून सोलापुरात आल्यावर त्यांनी आपल्या परमदेवतेच्या म्हणजे श्री मल्लिकार्जुनाच्या सुंदर मंदिराची निर्मिती केली. या मंदिराचे संपूर्ण वर्णन सिद्धरामेश्वराचे समकालीन कवी राघवांक यांनी आपल्या पुराणकाव्यामधून केले आहे. या मंदिरामध्ये स्वतः सिध्दरामेश्वरांनी स्वहस्ते शिवलिंगाची प्रतिष्ठापना केली. या मंदिराचे नाव श्री कपिलसिध्द मल्लिकार्जुन मंदिर असे ठेवले. तत्कालिन नियमांमुळे सुरक्षेच्या किल्ल्यात दर्शनासाठी जाण्यास भाविकांवर निर्बंध येऊ लागल्याने त्याकळी हे मंदिर बाळीवेस येथे स्थलांतरित करण्यात आले.
सध्या किल्ल्यात अवशेषरुपाने मंदिर शिल्लक आहे. या अवशेषांचा पुरात्त्व खात्याकडून कुडलसंगम येथील मंदिराप्रमाणे जिर्णोद्धार होणे आवश्यक आहे. या मंदिराची बैठक नक्षत्राकृती असून मंदिरात प्रवेश करण्यासाठी पायऱ्या आहेत. सभामंडपात दोन्ही बाजूस बसण्यासाठी कक्षासने आहेत. त्यावर अर्धवट कोरीव नक्षीकाम केलेले सुरेख खांब आहेत. अगदी समोरील बाजूस तळघरयुक्त गर्भगृह आहे. या गर्भगृहात उतरण्यासाठी एका बाजूस छोटीशी ओवरी आहे. परंतु आता पृष्ठभागावरील दगडी तुळईच्या झरोक्यातून शिवलिंगाचे दर्शन घ्यावे लागते. या मंदिराच्या संपूर्ण बाह्य भिंतीवर तुरळक प्रमाणात सुरसुंदरीचे शिल्पे, विविध व्यालशिल्पे, नागशिल्पे, विविध फुलांचे शिल्पे रेखाटलेली आहेत. काही प्रमाणात कामशिल्पेही शिल्पकारांनी साकारलेली आहेत. श्री कपिलसिद्ध मल्लिकार्जुन मंदिरास अनेकांकडून देणग्यांचा वर्षाव झालेला आहे. त्यात देवगिरीचे यादव, कदंब राजे आणि त्यांचे अधिकारी, मोठे व्यापारी, श्रीमंत सावकार अशा अनेक विविध वजनदार मंडळीकडून गावे, शेततळे वगैरे इनामे मिळाली आहेत. त्या सर्व घटनांची नोंद अनेक ठिकाणी सापडलेल्या शिलालेखातून करण्यात आलेली आहे.
ऐतिहासिक ठेवा विविध वस्तूसंग्रहलयात
किल्ला बांधण्यापूर्वीचे हे चालुक्यकालीन मंदिर असून येथे एक नंदीची मूर्ती, एक पद्मावती देवीची मूर्ती, दोन मोठे शैव द्वारपाल, दोन हळ्ळे कन्नड लिपीतील महत्वपूर्ण शिलालेख सापडले. पण शिवलिंग मात्र आढळले नाही. मिळालेले दोन शिलालेख व दोन मोठे शैव द्वारपाल संरक्षित करण्याच्या हेतूने मुंबईच्या रॉयल एशियाटिक सोसायटीच्या स्वाधीन करण्यात आले आहेत. तर शैवद्वारपाल व शिलालेख मुंबई येथील प्रिन्स आँफ वेल्स म्हणजे सध्याचे श्री छत्रपती शिवाजी महाराज वस्तूसंग्रहालयाच्या निर्मितीनंतर त्यांच्याकडे सोपविण्यात आले आहेत. तर पद्मावती देवीची मूर्ती चंदीगडच्या वस्तूसंग्रहालयात सुरक्षित आहे.
श्री सिद्धरामेश्वर निर्मित कपिलसिद्ध मल्लिकार्जुन मंदिर भुईकोट किल्यात आहे. या मंदिराचे जतन व संवर्धन शास्त्रीय पद्धतीने होणे आवश्यक आहे. कुडल- संगमच्या मंदिराप्रमाणे या मंदिराची पुनर्बांधणी झाल्यास भाविक व पर्यटकांसाठी धार्मिक पर्यटनासाठी प्रेक्षणिय स्थळ तयार होईल.
- नितीन अणवेकर,इतिहास अभ्यासक, सोलापूर
https://www.esakal.com/paschim-maharashtra/solapur/kapila-siddha-mallikarjuna-temple-restoration-bhuikot-fort-solapur-rjs00
1919 मध्ये किल्ल्यात सापडले 900 वर्षांपूर्वीचे प्राचीन मंदिर.किल्ल्याचा बुरुज पडला आणि त्याचे काम सुरू झाले. तेथील माती हटवली आणि त्याखाली हे मंदिर असल्याचे दिसले, त्यावेळी सोलापूरला सिमकॉक्स (1919) हे ब्रिटिश कलेक्टर होते.
किल्ल्यामध्ये असलेले श्री कपिलसिद्ध मल्लिकार्जुन मंदिर वास्तुकलेच्या दृष्टीने उत्कृष्ट ठरेल असेच आहे. उत्तर चालुक्यकालीन बांधणी शैलीचे हे मंदिर श्री सिद्धेश्वर महाराजांच्या काळातील आहे. किल्ल्याचा बुरुज पडला आणि त्याचे काम सुरू झाले. तेथील माती हटवली आणि त्याखाली हे मंदिर असल्याचे दिसले, त्यावेळी सोलापूरला सिमकॉक्स (1919) हे ब्रिटिश कलेक्टर होते. प्रांगणातील मंदिर पूर्वाभिमुुख आहे. उंच अधिष्ठानावर मंदिर उभे असून अधिष्ठानाचे स्तर स्पष्ट दिसतात. सद्यस्थितीला मंदिराची अतोनात पडझड झाली आहे. मंदिराचा विधान (ग्राऊंड प्लान) नक्षत्राकृती (म्हणजेच पुष्कळ कोन, प्रतिकोन असलेल्या एखाद्या तार्यासारखे दिसते.) आहे. मुखमंडप, सभामंडप, अंतराळ आणि गर्भगृह (गाभारा) अशी या मंदिराची रचना आहे. सद्यस्थितीला काही अर्ध्यामुर्ध्या भिंती, काही स्तंभ शिल्लक आहेत. छताचा भाग कोसळलेला आहे. गर्भगृह, अंतराळ आणि सभामंडपातील उत्तर बाजूकडील भिंत काही प्रमाणात शाबूत आहेत.
श्री कपिलसिद्ध मल्लिकार्जुन मंदिर पूर्णावस्थेत होते तेव्हा तो एक वास्तुसौंदर्याचा अलौकिक आविष्कारच असला पाहिजे. दर्शनाला आलेल्या व्यक्तींनी वाजवलेल्या घंटेचा आवाज येथील निसर्गरम्य शांत परिसरात घुमला असेल.
आधी मंदिर मग किल्ला
12 व्या शतकाच्या शेवटी आणि तेराव्या शतकाच्या सुरुवातीला होऊन गेलेले विख्यात महाकवी राघवांक यांनी लिहिलेल्या श्री सिद्धरामचरित्रे या कन्नड ग्रंथात या मंदिराचा उल्लेख आहे. श्रीशैलम येथून परतल्यानंतर शिवयोगी सिद्धराम यांनी सर्वप्रथम मल्लिकार्जुन मंदिराची निर्मिती केली. हे मंदिर तलावाच्या बाजूलाच असल्याचा उल्लेख राघवांक यांनी केला आहे. सोन्नलगी अर्थात सोलापूरचे तत्कालीन राजे ननप्पा आणि राणी चामलादेवी यांच्या योगदानाने हे मंदिर उभारले गेल्याचे ग्रंथात म्हटले आहे. आक्रमण काळात मंदिराची नासधूस झाली. मंदिर परिसरातील दगडांचा वापर 32 खांबी वास्तूत केल्याचे स्पष्टपणे दिसते. 15 व्या शतकापर्यंत हे मंदिर सुस्थितीत असावे, असे अभ्यासकांचे मत आहे.
https://www.solapursocialfoundation.org/info-details.php?id=4
भारतीय स्वातंत्र्यलढ्यात सोलापूरचे महत्त्वपूर्ण योगदान आहे. ब्रिटिश साम्राज्यशाहीच्या विरोधात सोलापुरातील कामगार वर्गाने फार मोठा संघर्ष केला आहे. भारत स्वतंत्र होण्यापूर्वी म्हणजेच 15 ऑगस्ट 1947 पूर्वी सोलापूर शहर ब्रिटिशांच्या नियंत्रणाबाहेर गेले होते. दिनांक 9, 10, 11 व 12 मे 1930 च्या दुपारपर्यंत सोलापूर मुक्त होते. 12 मे 1930 ला ब्रिटिश सरकारने मार्शल लॉ पुकारला. या लष्करी कायद्याच्या आधारे अनेक निरपराध व्यक्तींना शिक्षा करण्यात आली व ठार करण्यात आले.
सोलापूरचे स्वातंत्र्य आंदोलन चिरडण्यासाठी ब्रिटिशांनी मल्लप्पा रेवणसिद्धप्पा धनशेट्टी, जगन्नाथ भगवान शिंदे, अब्दुल रसूल कुर्बान हुसेन व श्रीकिसन लक्ष्मीनारायण सारडा यांना 12 जानेवारी 1931 रोजी फाशी देण्यात आली. स्वातंत्र्य आंदोलनासाठी आपल्या प्राणांचे बलिदान देऊन सोलापूरचे हे चार हुतात्मे अजरामर झाले. सोलापूरच्या बस स्थानकापासून दीड किलोमीटर अंतरावर हुतात्मा चौकात या चौघांचे पुतळे उभारण्यात आले आहेत. याच ठिकाणी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचा पुतळा उभारण्यात आला आहे. या इतिहासावरून भारताचे पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरू सोलापूरचा उल्लेख शोलापूर असा करीत असत.
स्वातंत्र्य मिळण्याआधीच म्हणजे 9 ते 12 मे 1930 या कालवधीत सोलापूरने 4 दिवसांचे स्वातंत्र्य उपभोगले होते. देशाच्या स्वातंत्र्यलढ्यात सोलापूरच्या 24 देशभक्तांनी आपल्या प्राणांचे बलिदान दिले.
मल्लप्पा धनशेट्टी
स्वातंत्र्य चळवळीच्या धगधगत्या यज्ञकुंडात स्वतःची आहुती देऊन मल्लप्पा धनशेट्टी हुतात्मा झाले. त्यांच्या अस्थी त्यांच्या सहकार्यांनी जपून ठेवल्या होत्या. त्या आजही त्यांच्या जोडभावी पेठेतील स्मारकात आहेत.
जगन्नाथ शिंदे
कामगार संघटनेत सक्रिय होते. 1857 ची स्मृती, बारडोली विजय दिन या कार्यक्रमांचे आयोजन केले होते. ते राहत होते त्या चौकाला शिंदे चौक असे नाव दिले आहे. प्रेस अॅक्टच्या जाचक अटींबाबत परखड भूमिका मांडली होती.
श्रीकिसन सारडा
1910 पासून लोकमान्य टिळकांच्या नेतृत्वाखाली सक्रिय सहभाग. सारडा हे धनाढ्य व्यापारी होते. लोकमान्यांच्या सोलापुरात सभा घेण्यासाठी प्रबोधन व आर्थिक मदत करत. 1915 साली त्यांनी मोठे योगदान लोकमान्य टिळक यांच्याकडे दिले होते.
कुर्बान हुसेन
लक्ष्मी विष्णू मिलमध्ये कामगार होते. ज्येष्ठ स्वातंत्र्यसैनिक डॉ. अंत्रोळीकर यांचे ते शिष्य. ते ङ्गगजनफरफ नावाचे साप्ताहिक चालवत. कवी कुंजविहारी यांची कविता ङ्गभेटेन नऊ महिन्यांनीफ याच साप्ताहिकामध्ये प्रसिद्ध झाली होती.
स्वातंत्र्यसंग्रामात प्राणाची आहुती देणारे सोलापुरातील हुतात्मे
- मोतीचंद परमचंद शहा
- दगडू तात्या कवले
- सदाशिव श्रीधर कुलकर्णी
- तात्या आवबा जाधव
- नारायण तुळशीराम
- नरसय्या कृष्णय्या त्यारला
- भोलागिरी बुवा
- गंगाराम भडंगे
- फतुसाहेब आवाजी
- कालिदास ओधवजी मिठाईवाला
- तुकाराम व्यंकप्पा कमटम
- गजाभाऊ काशिनाथ रानडे
- भानुदास तुळशीराम लोहार
- रतनलाल हिराचंद शहा
- शंकर सिद्रामप्पा शिवदारे
- सुंदरसिंग गुरुदाससिंग
- गंगाराम साबळे
- मल्लिकार्जुन स्वामी
- भाऊ रेवप्पा हुल्ले
- इरप्पा
हुतात्मा सोलापूर के चार
इतिहास में जगह तक नही!
रक्त मे लावा नही है हम में
पन्ने खंगालने की भूख नही!!
-विठ्ठल रणदिवे
सोलापूर - विजापूर महामार्गावरून जाताना तलावाच्या काठावर उभारण्यात आलेला झाशीच्या राणीचा अश्वारूढ पुतळा लक्ष वेधून घेतो. हा अतिशय रम्य असा तलाव आहे. या तलावात कमळे फुलतात म्हणून त्याला कमळ तलाव असे म्हणण्याची प्रथा होती. पुढे या तलावाला कंबर तलाव म्हटले जाऊ लागले.
ब्रिटिश सनदी अधिकारी अॅलन ह्यूम यांच्या मते या तलावाची निर्मिती 3 ते 4 हजार वर्षापूर्वी झालेली आहे. एखादा उल्कापात होऊन मोठा खड्डा पडतो आणि तिथे पाण्याचे झरे फुटून तलाव निर्माण होतो तसा हा तलाव उल्कापातातून निर्माण झालेला आहे असे ह्यूम यांचे म्हणणे आहे. या तलावात अजूनही जिवंत झरे आहेत. सोलापूर शहरात धर्मवीर संभाजी जलाशय (कंबर तलाव), त्याचा परिसर आणि स्मृती उद्यान ही नवी पर्यटन स्थळेच झाली आहेत. त्यांच्यामुळे सोलापूरचं निसर्गवैभव निश्चितच वाढलंय. स्मृती उद्यान हा तर अख्या महाराष्ट्रातला अग्रेसर प्रकल्प ठरला आहे !
संभाजी तलाव हा एक निसर्गरम्य परिसर आहे. या परिसरात थंडीच्या दिवसांत हजारो स्थलांतरित पक्षी आश्रयाला येत असतात. यातले काही पक्षी तर उत्तर ध्रुवावरून येत असतात. नामवंत पक्षी तज्ज्ञ सलीम अली यांना आणि पक्षी जीवनाचा अभ्यास करणार्या विहंगप्रेमींना ही जादूईनगरी वाटते. या परिसरात आता एक सुरम्य स्मृती उद्यान उभं राहिलं आहे. अनेक निसर्गप्रेमी पर्यटक आता या उद्यानाला मुद्दाम भेट देतात. ज्येष्ठ नागरिकांसाठी ते विरंगुळ्याचं चिंतनाचं ठिकाण झालं आहे. तलावाच्या भरावावरूनच विजापूर महामार्ग जातो. तलावाच्या मधोमध रेल्वेमार्ग आहे. रेल्वेतून पाहताना तलावाचे सौंदर्य खुलते.
1938 मध्ये चीनला भारतीय डॉक्टरांचे वैद्यकीय पथक पाठवले होते. चीनवर जपानने आक्रमण केले होते. युद्धातील जखमी सैनिकांवर उपचार करण्यासाठी डॉक्टर अपुरे पडत होते. अशासाठी भारताने मानवतेच्या भूमिकेतून 5 डॉक्टरांचे पथक 1938 मध्ये तिकडे पाठविले. यात सोलापूरचे डॉ. द्वारकानाथ शांताराम कोटणीस उत्स्फूर्तपणे सामील झाले. चीनच्या युद्धभूमीवर जाऊन डॉ. कोटणीस यांनी हजारो जखमी सैनिकांचे प्राण वाचविले. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत औषधे व साधनांची कमतरता असताना त्यांनी सैनिकांची सेवा केली. ते तिथेच राहिले. वयाच्या 32 व्या वर्षी त्यांचे चीनमध्येच निधन झाले. चीनची जनता आजही त्यांना देवदूत मानते. सोलापूरच्या भय्या चौकात डॉ. कोटणीस यांचे स्मारक आहे.
पूर्व भाग सार्वजनिक वाचनालय
तेलुगु भाषिक असूनही शहराच्या पूर्वभागातील तेलुगु भाषिकांनी मराठी साहित्याची सेवा सोडली नाही. कन्ना चौकातील मद्दा मंगल कार्यालयात पूर्वविभाग सार्वजनिक वाचनालय सुरू झाले. त्या काळी सोलापूर आणि यशवंत या सहकारी सूत गिरण्या अतिशय वैभवात होत्या. त्यांनी देणग्या दिल्यानंतर कन्ना चौकात रस्त्यालगत इमारत उभी केली. वाचनालय, ग्रंथालय आणि स्पर्धा परीक्षा केंद्र सुरू झाले.

























































































































No comments:
Post a Comment