Tuesday, February 15, 2022

पवनमावळातला दुर्गम दुर्ग मोरगिरी

  लोणावळा म्हणजे मुंबई-पुण्याकडील पर्यटकांच्या गर्दीने गजबजलेले शहर. आता तर येथील पवना धरणाच्या परिसरात एक रात्र राहण्यासाठी होत असलेली तंबुची सोय यामुळे नको त्या पर्यटकांचा देखील या भागात वावर वाढला असुन लोहगड-विसापुर-तुंग-तिकोना या किल्ल्यांवर देखील त्यांचे अस्तित्व दिसु लागले आहे. लोणावळा-मावळ परिसरातील गडावर मोठ्या प्रमाणात ट्रेकर्स आणि पर्यटकांची वर्दळ अनुभवता येते. खंडाळ्याच्या घाटात दर्शन देत असल्यामुळे व जाण्यास सोपा असल्याने गजबजलेला राजमाची, एन महामार्गावर असणारे लोहगड-विसापुर्,पवना धरणाच्या कॅम्पिंगमुळे प्रसिध्द झालेला तिकोना, तुंग, अ‍ॅम्बी व्हॅलीच्या पार्श्वभुमीवर असल्याने प्रकाशझोतात आलेला कोराईगड, डाईकच्या अफलातून रचनेमुळे भेट दिला जाणारा तेलबैल्या,छोटासा पण अवशेष संपन्न असणारा घनगड आणि अलिकडेच सर्वसामान्यांसाठी खुला झालेल्या ताम्हिणी घाटामुळे माहिती झालेला कैलासगड हे सर्व गड किमान नियमित ट्रेक करणार्यांना माहिती तरी आहेत.

मात्र या सर्व गडांच्या मधोमध असणारा पण आजही या सर्वापासुन अलिप्त असलेला अपरिचित गड म्हणजे किल्ले मोरगिरी. इतिहासात या किल्ल्याची कोठे नोंद नसल्याने व काहीसा अवघड श्रेणीत हा किल्ला असल्याने दुर्गप्रेमी वगळता कोणीही या किल्ल्याच्या वाटेला जात नाही. या भागात वहानांची फारशी सोय नसल्याने खाजगी वाहन वापरणे जास्त सोयीचे आहे. अशा या अपरिचित दुर्गाची आज आपल्याला भटकंती करायची आहे.
किल्ल्यावर जायला ३ वाटा आहेत, मोरगिरी किल्ल्याची चढाई दोन टप्प्यांमध्ये असुन गडमाथ्यावर जाण्यासाठी केवळ एकच वाट आहे. गडाखाली प्रचंड मोठे पठार पसरलेले असुन या पठारावर जाण्यासाठी तीन  ठिकाणाहुन मार्ग आहेत.
 १) जांभुळणे मार्गे :-
जांभूळणे गावातून किल्ल्याचा मार्ग दिला आहे.
 
 
 जांभुळणेमार्गे येताना या ठिकाणी झाडीत जाणार्‍या वाटा आहेत्,ज्या टाळायच्या
 
पहिली वाट ही घुसळखांब फाट्यावरून अंदाजे एक-दिड किमीवर असलेल्या जांभुळणे गावातून जाते तिथे सह्याद्री प्रतिष्ठानने फलक लावला आहे, फाट्यावरून किल्ल्याचा पायथा हा साधारण ३ किमीवर आहे,मुंबई पुण्याहून लोणावळा गाठावे. लोणावळ्याहून भुशी डॅम, आएनएस शिवाजी वरुन जाणाऱ्या रस्त्याने १६ किलोमीटर वरचा ॲम्बी व्हॅलीला जाणारा फ़ाटा गाठावा . या फ़ाट्यावरुन एक रस्ता ॲम्बी व्हॅलीकडे आणि दुसरा रस्ता तुंग किल्ल्याकडे जातो. लोणावळ्याहून भांबुर्डेकडे जाणार्‍या एस. टी बसने फ़ाट्यावर उतरुन तुंग किल्ल्याकडे जाणार्‍या रस्त्यावर जावे. तुंग किल्ल्याकडे जाणाऱ्या रस्तावर एस्सार ॲग्रोटेक आणि क्लब महिंद्रकडे असे फ़लक लावलेले आहेत. या रस्त्यावर फाट्यापासून दिड किलोमीटरवर जांभुळणे गाव आहे. खाजगी गाडीने थेट गावात जाता येते. 
गडाच्या वाटेवर लावलेल्या मार्गदशक पाट्या

जांभुळणे गावातील वस्तीतून गावा मागील डोंगरावर आणि तेथून पुढे किल्ल्यावर जाणारी पायवाट आहे . सुरवातीला आणि पायवाटेवरही " मोरगिरी किल्ल्याकडे" असे फलक लावलेले आहेत.
  २) मोरवे गावाकडून :-
noname
 मोरवे गावाकडून चढणार्‍या वाटेचा नकाशा
 
दुसरी वाट ही फाट्यावरून अंदाजे ५ -६ किमीवर असणाऱ्या मोरवे गावातून जाते.मोरगिरीच्या पठाराखाली असलेले मोरवे गाव हे किल्ल्याला जवळचे गाव असुन तेथुन किल्ल्यावर जाण्यासाठी सर्वात जवळचा मार्ग आहे. मोरवे येथे जाण्यासाठी तळेगाव येथुन सकाळी ९ दुपारी १२ व संध्याकाळी ५ वाजता वस्तीची बस असुन हि बस कामशेत-पवनानगर-जवणमार्गे मोरवे येथे पोहोचते. कामशेत ते मोरवे हे अंतर ३३ कि.मी.असुन घुसळखांबमार्गे लोणावळा ते मोरवे हे अंतर २३ कि.मी.आहे.याशिवाय स्वारगेट येथुन मोरवे गावासाठी दुपारी १२ वाजता बस सुटते पण ती फारशी सोयीची नाही. पुणे-पौड-जवण-अजिवली-मोरवे हे अंतर ६३ कि.मी आहे. याशिवाय लोणावळा येथुन घुसळखांबमार्गे किल्ल्याच्या पायथ्याशी असलेल्या पठाराखाली पोहोचता येते. कामशेत ते मोरवे हे अंतर ३३ कि.मी.असुन घुसळखांबमार्गे लोणावळा ते मोरवे हे अंतर २३ कि.मी.आहे. याशिवाय पुणे-पौड-जवण-अजिवली-मोरवे हे अंतर ६३ कि.मी आहे.
मोरवे गावातून दिसणारा मोरगिरी

 मोरवे गावातुन मोरगिरी किल्ला व त्यावरील भगवा झेंडा सहजपणे नजरेस पडतात. मोरवे गावातून पदरावर चढाईसाठी अर्धा तास आणि तेथून माथा अर्धा तास.. टंगळ-मंगळ करीत गेलो तरी दीड -दोन तासात माथा गाठायला पुरेसा.मोरवे गावातुन मोरगिरी किल्ला व त्यावरील भगवा झेंडा सहजपणे नजरेस पडतात. 
40898463130_bc3f88bb87_z
.मोरवे गावातुन लोणावळा येथे जाताना साधारण २ कि.मी.अंतरावर ब्रह्माहेवन हे गृहसंकुल आहे, या संकुलाच्या अलीकडे डावीकडे एक डांबरी रस्ता डोंगराच्या दिशेने वळतो. येथे कात्यायनी उपवनचा फलक लावलेला आहे. या रस्त्याने पुढे गेल्यावर डावीकडे बंद पडलेले हॉटेल असुन एक कच्चा रस्ता उजवीकडे वर जाताना दिसतो. हा कच्चा रस्ता थेट डोंगराला भिडलेला असुन वाहन सोबत असल्यास या रस्त्याने शेवटपर्यंत जाता येते.
एस्सार कंपनी आणि त्याच्या समोरील लहान घर

इथे असणार्या नर्सरीच्या समोर एक लहान घर लागते. हे घर खाजगी मालमत्तेत असल्यामुळे पूर्ण जागेला तारेचा कुंपण आणि एक मोठा लोखंडी गेट आहे. डोंगराच्या पायथ्याला घर असल्यामुळे, कुंपणाच्या तिन्ही बाजूने डोंगर आणि झाडाने वेढलेले आहे. त्या घरात, ती जागा सांभाळण्याचे काम करणारे दंशू आखाडे आणि त्यांचे कुटुंब राहते.आखाडे काकां आपल्याला गडावर जायचे मार्गदर्शन करतात.त्यांच्या घरामागून असलेल्या डोंगराच्या घळीमधून पठारावर पोहचून, पठारावरून डाव्याबाजूने गडावर जायचे असा रस्ता आहे.त्यांच्या जागेत असलेल्या उंबराच्या झाडाकडून उजव्या बाजूला तुटलेल्या कुंपणाच्या बाहेर पडलो. 
कुंपणाच्या बाहेर पडून घळीतून पठारावर जाताना सुरवातीची वाट 
41808794975_a4aa462076_z
कुंपणाच्या बाहेर आल्यावर, एक वाट डावीकडे घळीच्या दिशेने जाते. ह्या वाटेत एका ट्रेकरने वाट दर्शवण्यासाठी दोन ते तीन ठिकाणी ३/४ इंचाचे लॅमिनेट केलेले बाणाचे चिन्ह झाडाला लावले आहेत. त्यामुळे पठारावर लवकर पोहचायला मदत होते.  (ह्या वाटेने अर्ध्यावर पोहचल्यावर आपल्याला घळ लागते.)  
घळीमधील वाट

घळेतून वर गडाच्या दिशेने आपण पठारावर पोहचतो.पायथ्यापासून किल्ला बिलकुल दिसत नाही त्यामुळे चढाई नेमक्या कोणत्या दिशेने करणे आवश्यक आहे हे नीट समजावून घ्यावे.रस्ता जेथे संपतो तेथे एक ठळक पायवाट झाडीत शिरताना दिसते.घराच्या इथून चालायला सुरवात केली,कि सुरवातीला वाट जंगलातून जाते आणि नंतर घळीतून वर जाते, वाट एकदम मळलेली नसली तर कळण्याइतपत नक्की आहे.  या पायवाटेने १० मिनिटात आपण पठारावरून खाली उतरलेल्या एका घळीत पोहोचतो.वाटेला बऱ्यापैकी घसारा आहे. 
घळीमधून  पठारावर येताना 

   या घळीतून चढाईला सुरवात केल्यावर अर्ध्या तासात आपण पठारावर पोहोचतो. येथे समोर डाव्या बाजुला दाट झाडीमागे दक्षिणोत्तर पसरलेला मोरगिरी किल्ल्याचा माथा व त्यावर फडकणारा झेंडा नजरेस पडतो.  
  ३) एस्सार अ‍ॅग्रोकडून :-

 एस्सार अ‍ॅग्रोजवळून मोरगिरी किल्ल्यावर जाणारी वाट
 
   तिसरी वाट जी एस्सार ऍग्रोटेक कंपनीच्या समोरून जाते, तिसरी वाट ही किल्ल्यावर जरा लवकर दीड-दोन तासात घेऊन जाते.हा मार्ग तुंग किल्ल्याकडे जाताना वाटेत असलेल्या एस्सार ऍग्रोटेक या कंपनी जवळुन जातो पण हा मार्ग जास्त प्रमाणात वापरात नाही. यासाठी लोणावळा येथुन घुसळखांबमार्गे किल्ल्याच्या पायथ्याशी असलेल्या पठाराखाली पोहोचता येते.  

 
 या रस्त्याने जाताना मोरगिरीच्या डोंगररांगेला उजवीकडे ठेवत गाडीरस्त्याने वळसा घालत गेल्यावर पलिकडून मोरवे गावाजवळून! 'एस्सार अ‍ॅग्रोटेक'पाशी तुंग किल्ल्याचा गाडीरस्ता सोडायचा आणि उजवीकडे 'जवण'कडे जाणाऱ्या रस्त्यावर वळायचे. 
'कात्यायनी उपवन' आणि 'सूर्यवंशी पाटील एस्टेट' पाटीपासून उजवीकडे वळल्यावर, समोर मोरगिरीचा कातळ माथा दिसतो.गडाकडे पाहिल्यावर जाणवते, की चढाई दोन टप्प्यांमध्ये असणार होती. माथा ५०० मीटर उंचावला होता. चढाई मार्ग असा आहे -उत्तरेकडे उतरणाऱ्या घळीतून चढायचं; मोरगिरीच्या पदरात पोहोचायचं आणि मग गडाच्या माथ्यासाठी वेगळी चढाई.

  कच्च्या गाडीरस्त्यावरून चालायला सुरुवात केल्यावर रस्ता हळूहळू अरुंद होत गेला.ह्या बाजूने जाताना रस्त्याने पुढे गेल्यावर डावीकडे बंद पडलेले हॉटेल असुन एक कच्चा रस्ता उजवीकडे वर जाताना दिसतो. हा कच्चा रस्ता थेट डोंगराला भिडलेला असुन वाहन सोबत असल्यास या रस्त्याने शेवटपर्यंत जाता येते. किल्ला तसा इथून दिसतच नाही. त्याआधीचे पठार आहे, 
 
 
तिथे पोचायचे लक्ष ठेवून त्याप्रमाणे ह्या वाटेने वर जात रहायचे. बऱ्यापैकी मोठाले दगड चढून गेल्यावर समोर थोडं मोकळं-मोकळं दिसायला लागते आणि दिसतो तो मानवनिर्मित कातळात खोदलेला रस्ता.कोण्या कंपनीने किल्याच्या पठारावर जाण्यासाठी बुलडोजर आणून  एका भल्या मोठ्या घळीतून चक्क रस्ता काढण्याचा प्रयत्न केलेला दिसतो. मात्र वन खात्याने बंदी आणल्याने आणि रस्त्यात मोऱ्या न काढल्याने पूर्ण रस्ता वाहून गेला होता आणि जागोजागी खडक वाहून आले होते.एकप्रकारे रस्ता करण्याचा हा प्रयत्न निसर्गाने हाणून पाडला होता. म्हणजे दरड कोसळून-कोसळून तो रस्ता शेवटी पूर्ण झालाच नाही म्हणे. त्यातून वाटचाल करत रस्ता जेथे संपतो तेथे आपण पोहचतो.
40898474800_cb6c00f670_z
मोरगिरीवर रस्ता बांधायचा झालेला प्रयत्न
यामार्गाने जाताना तसं बघायला गेलं तर रस्ता असा दिसत नाही, वाट ही फार मोडलेली दिसत नाही.पुढे तर मोरगिरीच्या घळीच्या दिशेने आडवी जाणारी वाट अस्पष्ट आहे की शोधावीच लागते. जांभूळवाडीतून रस्ता झाल्याने ह्या बाजूने किल्ल्यावर कदाचित कोणीच येत नाही. पाण्याची वाट आणि त्यातून वाहत कोसळत आलेली वरची दरड. जणू नळीची वाट तयार झाल्यासारखी. एक-दोन वळणं घेतली तर चक्क रुंद खोदाई केलेला रस्ता दिसतो. रस्ता जेथे संपतो तेथे एक ठळक पायवाट झाडीत शिरताना दिसते. या पायवाटेने १० मिनिटात आपण पठारावरून खाली उतरलेल्या एका घळीत पोहोचतो. या घळीतून चढाईला सुरवात केल्यावर अर्ध्या तासात आपण पठारावर पोहोचतो. येथे समोर डाव्या बाजुला दाट झाडीमागे दक्षिणोत्तर पसरलेला मोरगिरी किल्ल्याचा माथा व त्यावर फडकणारा झेंडा नजरेस पडतो.
 
 


पठारावर आल्यावर लांबवर असणारा मोरगिरी !
मोरगिरी गडाच्या पठारावरुन समोर देवधर डोंगर आणि मागे उंचावलेला तुंग किल्ला

   तीन पैकी कोणत्याही वाटेने आपण पठारावर पोहोचलो कि येथे समोर डाव्या बाजुला दाट झाडीमागे    दक्षिणोत्तर पसरलेला मोरगिरी किल्ल्याचा माथा व त्यावर फडकणारा झेंडा नजरेस पडतो. पठारावरून गडाचा डोंगर उजवीकडे व दरी डावीकडे ठेवत पायवाटेने चालायला सुरवात केल्यावर १० मिनिटात आपण किल्ल्याच्या खाली उतरलेल्या दक्षिण धारेवर पोहोचतो. येथे वाट दाखवण्यासाठी दगड रचुन बाण बनवलेला आहे.
मोरगिरी किल्ला आणि त्याच्याकडे जाणारी वाट

साधारण पठारावरून डावीकडे चालत असताना तुम्हाला लहानशी मळलेली वाट पकडायची.इकडे गुराखी आणि त्याच्या गुरांचा चांगलाच वावर असावा. हीच वाट किल्ला जवळ येतायेता नंतर मोठी होत जाते.दहा मिनिटातच ती दाट झाडी संपून पुढे विस्तीर्ण पठार लागले, अगदी झाड विरहित! पण आपल्याला झाडीला धरूनच जायचं आहे.
 गड सतत आपल्या उजव्या बाजूला राहतो आणि वरती मी  पिवळ्या तुटक रेषेने,  अंदाजे वाट गड माथ्यावर कशी जाते दाखवायचा प्रयत्न केला आहे. 
गडाचा माथ्यावर जाणारी वाट. झाडाला मी पिवळ्या रंगाने वर्तुळ केला आहे. तेथे "किल्ल्यावर" अशी लॅमिनेट केलेली पाटी लावली आहे. 
गडाच्या  माथ्यावर वाट कशी जाते. हे मी अंदाजे पिवळ्या रेषेने दाखवायचा प्रयत्न केला आहे. 

आता फक्त इतकी चढाई बाकी !

गड दिसायला लागला. पठारावरून वाटेने चालत असताना, गड सतत आपल्या उजव्या बाजूला असतो. आपल्या पाठीमागे तुंग किल्ला आणि डावीकडे डोंगरमाळ आणि त्याचा पसरलेला मोठा पठार दिसत असतो.साधारण २० मिनिटे चालल्यावर एक वाट उजवीकडे जंगलातुन वर घेऊन जाते, वाट सहजासहजी दिसत नाही.वाट झाडामध्ये असल्यामुळे लगेच दिसून येत नाही. त्यामुळे येथे नीट लक्ष ठेवून चालावे अन्यथा वाट चुकण्याची दाट शक्यता आहे. जर ही गडावर जाणारी वाट तुम्हाला सापडली नाही, तर तुम्ही चुकून वाटे बरोबर पुढे पठारावर पोहचाल आणि गड मागे राहील.
ह्या फलकाकडे लक्ष ठेवा आणि वरती किल्ल्याकडे जाणारी वाट पकडा
वास्तविक इथे 'किल्ल्याकडे' असा एका झाडावर सह्याद्री प्रतिष्ठानने लावलेला दिशादर्शक फलक लावला आहे पण तो फलक झाडांच्या फांद्यांमध्ये लगेच कळून येत नाही.
माथ्यावर जाताना वाट झाडा-झुडपातून जाते 


जंगलवाटा
 येथुन किल्ल्यावर जाणारी वाट म्हणजे उभा चढ असुन सुरवातीची ५ मिनिटांची वाट दाट झाडीतुन जाणारी आहे. उंच उंच वृक्ष, त्यातून चढाव. पण दाट सावली. ऊन खालपर्यंत पोचतच नाही. मोठी झाडं संपल्यावर कारवी. आधार म्हणून कारवी उपयोगी पडते, नाहीतर प्रचंड घसरगुंडीच आहे इथे. दहा मिनिटात ना जंगल, ना कारवी असा उघडा पॅच. मागे दरी आणि खाली घसरला तर कष्टाने चढून आलेलं अंतर घसरत जाऊन सरळ कारवीत, नाहीतर जंगलातच परत जायचं. म्हणजे सापशिडी खेळताना अगदी ८० पर्यंत पोचून सापाच्या तोंडातून परत दहावर जाण्यासारखं. 

उघडा आणि घसाऱ्याचे पॅच
इथे एक पॅच अगदी सांभाळून, म्हणजे अगदी तंगड्या फाकून चढायचा असा. एक होल्ड एकदम डावीकडे, तर पुढचा एकदम उजवीकडे. बरं मातीवर पाय ठेवायची सोय नाही, नाहीतर पुन्हा सापाच्या तोंडातून खालीच.तर असं अजून पंधरा मिनिटं गेल्यावर समोर कातळकडा आणि पुन्हा उजवीकडे दरी. पण इथून ते जंगलाच्या आधीचे पठार काय सुंदर दिसते. विस्तीर्ण! पलीकडे तर डोंगरच डोंगर.हा अर्ध्या तासाचा चढ तीव्र घसाऱ्याचा असुन चांगलाच दमछाक करणारा आहे. ह्या वाटेत माती जास्त असल्यामुळे चढतेवेळी आणि उतरतेवेळी जपून जायायला लागते. खासकरून उतरतेवेळी. माती जास्त असल्यामुळे, घसरण्याची खूप शक्यता आहे. वाटेत काही ठिकाणी छोटे दगड लागतात. आम्हाला उतरते वेळी उन्हाने दगड तापल्यामुळे, हात ठेवताच जोराचे चटके लागतात.उन्हाळ्यात मात्र इथे प्रचंड घसारा असणार, आणि हाच चढ अधिक धोकादायक होणार ह्यात शंका नाही. उन्हाळ्यात इथे येणं टाळावं.वाटेत एक दोन ठिकाणी सात-आठ फुटांचे अवघड टप्पे लागतात. हे सर्व पार करून आपण गडमाथ्याच्या अगदी जवळ पोहचतो.
अगदी थोडक्या जागेत उभी असणारी मंडळी. तिथेच डाव्या बाजूला देवीचंठाणं आणि समोरच्या कातळ भिंतीवर शिडी आहे.

खडा चढ चढून वर आल्यावर, गडाच्या माथ्यावर जाण्यासाठी वाटेने चालायला लागलो असता, या वाटेने गडाच्या कातळ माथ्याखाली आल्यावर कातळात कोरलेल्या ४-५ पायऱ्या नजरेस पडतात. त्या चढुन वर आल्यावर कातळात कोरलेले पाण्याचे टाके पहायला मिळते. एका चिंचोळ्या वाटेवर ,कड्यात खोदलेली ३ पाण्याची टाकी आहेत, आपल्याला एका पाठोपाठ ठराविक अंतरावर अश्या ३ लहान टाक्या लागतात. पहिल्या दोन्ही टाकी कातळात खोलगट खोदलेल्या दिसतात.
बाणाने तीन टाक्या दाखवल्या आहेत
बाणाने शिडी आणि वरती पायऱ्या दाखवल्या आहेत
जाखमाता देवीची तांदळा स्वरुपातील मूर्ती आणि तिसरी टाकी 
शिडी चडून  वर आल्यावर कातळावरून काढलेला फोटो. ह्यात आपण खडा चढ चडून आल्यावर. शिखराचा कातळ लागतो त्याचा पासून कशी वाट टाकी जवळून माथ्यावर जाते ते दाखवायचा पिवळ्या रेषेने दाखवायचा प्रयत्न केला आहे. आणि वर्तुळात पहिल्या दोन टाक्या कुठे लागतात. ते दाखवला आहे. 


तीन टाकीच्या बाजूने गड माथ्यावर जाणारी वाट. आणि तिसऱ्या टाकी जवळ, गड  माथ्यावर जाण्यासाठी असलेली शिडी सुद्धा दिसत आहे. 
पहिली टाकी 


दुसरी टाकी आणि खाली बाहेरून काढलेला फोटो 
देवीचे  मंदिर आणि तिसरी टाकी 
पहिल्या टाकीतील पाणी अस्वच्छ आहे. दुसऱ्या टाकीचे पाणी वरून हिरवे दिसते.  दोन्ही टाकी अंदाजे ५ फूट खोल असतील.पण पाणी पिण्यायोग्य वाटत नाही. एका गुहेत जाखाई देवीचे ठाणे आणि एक टाके एकत्रच आहे,तिसऱ्या टाकीचे तोंड लहान गुहेसारखे आहे. ह्यात जाखमाता देवीचे मंदिर आहे.मंदिरात देवीची मूर्ती शेंदूर लावलेली तांदळा स्वरूपातील आहे. गुहेच्या आत एका कातळावर जाखमाता मोठया अक्षरात लिहिले आहे.तांदळाच्या रूपात असलेली हि जाखदेवी ह्या भागातील लोकांची कुलस्वामिनी.देवीचं ठाणं म्हणजे कातळात खोदलेली, अंदाजे पाच बाय सहा फूट इतकी छोटीशी गुहा आहे. ह्याच गुहेत एक पाण्याचं टाकं आहे. टाकीत प्लेट वैगेरे कचरा टाकलेला दिसतो. तरी पण टाकीतील पाणी नितळ आणि स्वच्छ दिसत होते. म्हणून ह्या टाकीतील पाणी प्यायला हरकत नाही.एका शेजारी एक अशी जेमतेम पाच-सहा मंडळी बसतील इतकीच गुहेच्या बाहेर जागा. समोर तीनशे फुटांचा थेट ड्रॉप !
पिण्यायोग्य पाण्याचे टाके
जाखमातेचे देवस्थान
इंद्रव्रज
 
    आजूबाजूला बर्‍याच ठिकणी शेंदूर फासलेला आहे. एक पडलेला लोखंडी बोर्ड आणि पोल गुहेतच आडवा करून ठेवलेला आहे. त्या टाक्यात वाकून बघताना सूर्यदेवाच्या कृपेने नेमकं आपल्याच डोक्याभोवती इंद्रव्रज दिसतं.मंदिराजवळ सोलर लॅम्प लावलेला दिसतो.गुहेच्या पलीकडे लागूनच एक मस्त मजबूत शिडी उभी केलेली आहे. अत्यंत मोक्याच्या ठिकाणी शिडी आहे कारण उजवीकडे दरी आहे. सहयाद्री प्रतिष्ठानने १० फुटी शिडी लावल्याने किल्ल्यावर पोहचणे सोपे झाले आहे.इथे आता रोपची गरज लागत नाही.
 
 
    पुर्वी इथून गडमाथ्यावर जायचे तर सूर्य दिव्यापाशी उजवीकडे थरकाप उडेल,पाय लटपटतील अश्या १० फुटी कातळ कड्यातून माथ्यावर जाण्यास वाट आणि खाली ६०-७० फूट कडा , ही वाट पार करून एक छोटा खडक अंमळ कसरत करून चढावा लागतो.पुर्वी असे प्रस्तरारोहण करुन वर चढणे म्हणजे एक थरार होता.पण आता येथे १० फुट उंचीची लोखंडी शिडी लावल्याने सहजपणे वर जाता येते.
मंदिराच्या बाजूला गड माथ्यावर जाण्यासाठी लावलेली शिडी  

शिडी चढून वर आल्यावर लागणाऱ्या पायऱ्या    
 
  पहिल्या पायऱ्या चढून आल्यावर वरती ह्या पायऱ्या लागतात. ह्या पायऱ्या चढून गेल्यावर आपण गड माथ्यावर पोहचतो.

 
 
मोरगिरीचा रॉकपॅच
 
शिडी जेथे संपते त्याच्यावर २ फुटावर एक मोठा लोखंडी खिळा मारलेला आहे . त्या खिळ्यावर भार देउन शिडीच्या शेवटच्या पायरीवरुन बाजूच्या कातळावर काळजीपूर्वक उतरावे लागते . शिडीवरून जाताना पाठमोरी बघितलं तर डोळे चक्रावतील अशी खोल दरी दिसते !शिडी पार केली की पुढे कातळात कोरलेल्या पायऱ्या आहेत त्या चढून गेल्यावर बऱ्यापैकी सपाटी असलेला भाग आहे . इथून किल्ल्यावर चढण्यासाठी कातळात कोरलेल्या पायऱ्या आहेत पायऱ्या चढून डावीकडे वळण घेत गडाच्या सर्वोच्च टोकावर आपण ५ मिनिटात गडावर पोहोचतो.
 
 
 
 डावीकडे आपल्याला गडाचा माथ्यापर्यंत कातळाला मोठी फट गेलेली दिसते. हि फट आपल्याला जेव्हा गडाचा माथा दिसायला लागतो तेव्हा पासूनच दिसते. ( झाडीतून गडमाथ्यावर येणारी वाट जर सापडत नसेल. तर गडाच्या कातळाची हि घळ किंवा फट लक्षात ठेवणे. त्याच्यावरून तुम्हाला अंदाज येईल, गडाच्या माथ्यावर जाण्यासाठी ह्या घळीच्या पुढेच वाट वर येते. )
गडावरील भगवी झेंडा/पताका आणि खालील फोटो त्याचाच बाजूला असणारी मोठी टाकी दिसत आहे त्याचा बाजूला झुडपावर जेथे बाण दाखवला आहे.  तिथे खाली गडाचा कडेला पाण्याची छोटी सुखलेली टाकी आहे.  त्या टाकीचा फोटो,  हि मोठ्या टाकीचा फोटो खाली लावला आहे  आणि त्याचा बाजूने वाट पुढे गडाच्या दुसऱ्या बाजूला घेऊन जाते. 


मोठ्या टाकीच्या बाजूला, गडाचा कडेला असलेल सुखलेल टाके. 
किल्ल्याच्या गडमाथ्यावरील  झेंडा, मोठी टाकी आणि लहान सुकलेली टाकी
कुणाल, विनय आणि पवना धरणाचा विस्तृत जलाशय
 
माथ्यावरील पाण्याचं टाकं
  पायथ्यापासुन गडमाथ्यावर येण्यास दीड तास पुरेसा होतो. किल्ल्याचा माथा समुद्रसपाटीपासुन ३५४० फुट उंचावर असुन साधारण अर्धा एकरवर पसरलेला आहे. माथ्यावर भरपूर गवत आहे.माथ्यावर कातळात कोरलेली पाण्याची दोन टाकी पहायला मिळतात. यातील एका टाक्यात पाणी असले तरी ते पिण्यायोग्य नाही तर दुसरे टाके कोरडे पडलेले आहे. 
मोरगिरीचा रॉकपॅच
इथे डावीकडे एक ध्वजही आहे. माथ्यावर बुरुज अथवा तटबंदी यासारखे बांधकामाचे कोणतेही अवशेष दिसुन येत नाहीत.नाही म्हणायला १८८५ च्या बॉम्बे प्रेसिडेन्सीच्या गॅझेटीयरमध्ये पुणे जिल्ह्यातील डोंगरांचे वर्णन करताना एक नोंद आढळते. "About six miles south of Dukes Nose and a mile inland from crest line of the Sahyadris. rises the lofty picturesque range known as the Jambhulni hills". पुणे-मुंबई प्रवास करताना मळवली-लोणावळा दरम्यान एखाद्या ज्वालामुखीच्या निमुळत्या शिखरासारखे हा दुर्गमाथा डोकावताना दिसतो.
 गडमाथा फिरण्यासाठी १० मिनिटे पुरेशी होतात. मात्र जोत्याचे बांधकाम सापडले नाही.दुर्गवास्तू (आनंद पाळंदे) पुस्तकानुसार - गडावर कौलाची खापरे, शिशाच्या चपट्या विटा इथे होत्या, अशी नोंद आहे आणि मोरव्यातून मोराची पिसे पुण्यात पाठवली ,जात  अशी नोंद पेशवे दफ्तरात आहे.मोरव्यातून मोराची पिसे पुण्यात पाठवली जात अशी नोंद पेशवे दफ्तरात येते पण ते मोरवे व मोरगिरी किल्ल्याखाली असलेले मोरवे एकच का? याबाबत संभ्रम आहे.या गडाचा इतिहासात फारसा उल्लेख नसला तरी कदाचित शिवाजी महाराजांनी पुरंदर तहाच्या वेळी जे तेवीस किल्ले मिर्झाराजे जयसिंह यांना दिले त्यात कदाचित हा गड असावा.कारण याच परिसरातील तुंग्,तिकोना, लोह्गड्,विसापुर हे गड मोघलांना द्यावे लागले.हा गड विशेष लढावू नसल्यामुळे तसेच फार महत्वाचा नसल्यामुळे आणि तेवीस किल्ले द्यायचे असल्यामुळे संख्या वाढविण्यासाठी हा गडही त्यात असावा.कदाचित शिवकालात या गडाचे दुसरे नाव असावे.खांदकडा किंवा मार्गगड असे उल्लेख त्या तहातील तेवीस नावात दिसतात्,ज्याचा आपल्याला अद्याप उलगडा झालेला नाही,बहुधा हा मोरगिरी त्यात असावा.अर्थात यासाठी आपल्याकडे काही पुरावा नाही,हा फक्त एक अंदाज.
  एकंदरीत या गडाचा तोकडा माथा पाहिला कि पूर्वीच्या काळी ह्या किल्ल्यांवर लोक कसे रहात असावेत ह्याची आपण केवळ कल्पना करावी.. मोरगिरी काय, कोकणदिवा काय.. इतरही काही किल्ले... इतकीशी टीचभर जागा तिथं. असे किती लोक तैनात असावेत? आजूबाजूच्या किल्ल्यांवर रात्री तेवणार्‍या मशालींच्या उजेडानीही किती धीर मिळत असेल त्यांना !
मोरगिरी सह्यधारेच्या जवळ असल्याने पश्चिमेच्या कुरवंडे - आंबेनळी - पायमोडी - सव अश्या जुन्या घाटांमधून होणाऱ्या दळणवळणावर लक्ष ठेवण्यासाठी जागा मोक्याची! माथ्यावरून लोहगड-विसापूर-तुंग-तिकोना-कोरीगड तर 'मशाली'च्या अंतरावर! त्यामुळे, एक टेहेळणीची चौकी असं मोरगिरीचं प्रयोजन असणार.
सह्याद्रीच्या एन माथ्यावर असुनही गडाच्या डोंगराखाली असलेले प्रशस्त पठार हे या गडाचे वैशिष्ठ म्हणावे लागेल. 
 
 
 


परम पवित्र भगवत ध्वज की जय !

कातळ चढताना खाली पसरलेलं पठार

पावना धरणाचे दृश्य !

समोरच असणारा तुंग किल्ला आणि अलीकडला किल्ल्यासादृश  भासणारा डोंगर.
 
तुंग किल्ला
कोरीगड किल्ला
 

(प्रकाशचित्र साभार: निनाद बारटक्के)
इथून इशान्येकडे तुंग किल्ला डोकं वर काढून आपल्याकडे बघत असलेला दिसतो. त्याच्या आधी एक पसरलेला डोंगर दिसतो त्याचं नाव देवघर डोंगर.पुढे बऱ्यापैकी अंतरावर लोहगड आणि विसापूर हे किल्ले दिसतात, तसेच तिकोना  डोकावताना दिसतो.तर वायव्येकडे राजमाची,आय.एन.एस. शिवाजीचा परिसर्,तर नैऋत्येला कोराईगड,सालतरचा भोजाचा डोंगर,दक्षिणेला कैलासगड दिसतो.
संदर्भ :-
१) डोंगरयात्रा-आनंद पाळंदे
२) डोंगरमैत्री-आनंद पाळंदे
३) संदर्भ- डोंगरयात्रेत दिसलेल्या दुर्गवास्तू – आनंद पाळंदे ( पान ३२१ ) प्रफुल्लता प्रकाशन
४) http://invisiblepranav.blogspot.com/2018/04/blog-post.html,
 http://www.thegypsyprincess.com/2016/01/morgiri.html  
 http://bhushankarmarkarworld.blogspot.com/2019/10/blog-post.html
https://kunalstrek.blogspot.com/2018/03/morgiri-fort.html
 https://www.discoversahyadri.in/2015/11/FortMorgiriPavanMaval.html
https://punetrekss.blogspot.com/2020/04/morgiri.html
    हे ब्लॉग
५)  www.trekshitiz.com हि वेबसाईट
६) www.durgbharari.in  हि वेबसाईट
 

No comments:

Post a Comment

मनसर

 प्रकार : गिरीदुर्ग जिल्हा : नागपुर उंची : १२०० फुट ...