नाग शिल्प :-
मराठीत नागशीला म्हणून संबोधन केल्या जाणाऱ्या या शिला सारा भारत नागपूजक होता हे सिद्ध करतात. नागाला विषारी दंश असल्याने मानवजातीला त्याची प्रारंभी पासूनच भीती होती. त्याचे हे अस्त्र किती घातक आहे. याची प्रचिती सातत्याने मानवाने घेतलेली असल्याने तो या नागां पासून दूर राहात असे. भीतीतून आकर्षणाचा जन्म झाला. या सर्प योनीची भीती इतकी जबरदस्त होती की, त्यातून तो नागपूजेकडे वळला. पाय किंवा पंख नसताना होणार्या वेगवान, रहस्यमय, तरीही सुंदर हालचाली , त्याचे आकर्षक डोळे, वेगाने अदृश्य होण्याची शक्ती,नागाचे जमीन आणि पाण्यात ही वास्तव्य, कात टाकून द्विजत्व प्राप्त करून घेणे, त्याच्या द्विजिव्हा, हस्त - पाद - पंख विरहित शरीर, आश्चर्यकारक संभोग, अप्रतिम नागफना, त्याचा फुत्कार, त्याची भेदक नजर या सर्वांमुळे नाग मानवजातीत कुतूहल आणि आदराचा विषय बनला व त्यातूनच वेगवेगळ्या समजुती प्रचलित होऊन नागपूजा अस्तित्वात आली असावी आणि अनेक दंतकथा आणि लोककथांचा विषय बनला. प्राण्यांची पूजा करणाऱ्या पंथांमध्ये, जसे की नागांची पूजा करणाऱ्या पंथांमध्ये, त्याच्या अनुयायांमध्ये प्राण्यांच्या जादुई शक्ती, परोपकार, उपचार शक्ती, शहाणपण आणि गुप्त उच्च ज्ञान ताब्यात असल्याचा दृढ विश्वास आढळतो. प्राचीन जगात अरबस्तान, पर्शिया, आशिया, सीरिया, इजिप्त, इटली, ग्रीस, उत्तर आणि पश्चिम युरोपच्या अनेक भागांमध्ये, सध्याच्या लॅटिन अमेरिकन राष्ट्रांमध्ये, चीन, श्रीलंका आणि जपानमध्ये नागांची पूजा लोकप्रिय आणि सार्वत्रिक होती. तथापि, भारतात नागा पंथाला विशेष महत्त्व प्राप्त झाले आणि इतर राष्ट्रांपेक्षा वेगळे, त्याने अनेक विवीध प्रकारांसह अधिक विकसित स्वरूप धारण केले आणि ते अधिक व्यापकपणे विस्तारित झाले. भारत हा असा देश आहे जिथे नेहमीच विविध प्रकारचे साप आढळत होते आणि त्यांच्या विषारी चावण्यामुळे होणाऱ्या मोठ्या संख्येने मृत्यूंवरून हे स्पष्ट होते की प्रागैतिहासिक काळापासून नागांना किंवा नागांना घाबरले जात होते, त्यांचा आदर केला जात होता आणि त्यांची पूजा केली जात होती.

नाग पूजेची सुरुवात सर्वप्रथम इजिप्तमध्ये झाली असे मत सी. एफ. ओल्डहॅम यांनी आपल्या The sun and the Serpent a contribution to the History of Serpent Worship या ग्रंथात मांडले आहे. तर ग्राफिटन एलीएट स्मिथ यांनी, 'Geographical Distribution of the Practice of Mummification.' यात संशोधनपर अभ्यास करताना सूर्य पूजा आणि सर्प पूजा यांचा जन्म ईजिप्तमध्ये झाला असल्याचे सूचित केले आहे. जगात जिथे जिथे या पूजा केल्या जातात. त्या इजिपशीयन प्रभावातून केल्या जातात असेही ते मानतात. परंतु या मताला लायन कॅप यांनी मात्र विरोध दर्शविला आहे. ते Lost continent's the Atlantis the me in History science and literature या ग्रंथात असे म्हणतात, "संस्कृतीचे एकच एक केंद्र असते व तिथून ती संस्कृती जगात प्रसरण पावते असे समजणे योग्य नाही. वास्तविक संस्कृतीचे विशेष जगात अन्यत्र पसरत असतात. म्हणून इजीप्तच्या लोकांना किंवा अन्य कोणत्याही लोकांना अशी श्रेय देणे योग्य होणार नाही."
भारतात सर्वत्र नागपूजा प्रचलित आहे. वेदपूर्व काळापासून भारतात नागपूजा प्रचारात होती. मोहोनजोदाडो येथील उत्खननामध्ये सुद्धा नाग मूर्ती आढळल्या आहेत. नाग विषारी असल्यामुळे मनुष्याला त्याची फार भीती वाटते. ऋग्वेदामध्ये नागाचा उल्लेख 'अहि' या शब्दाने केला असून तेथे त्याची क्रूर, घातकी व भयंकर असे वर्णन केलेली आहेत. नागाची स्तुती करून त्याला वश करून घेतले तर त्यापासून भय राहणार नाही. या कल्पनेने यजुर्वेदात नाग स्तुतीपर मंत्र आढळतात. नागपूजा नागापासून वाटणाऱ्या भयातून सुरू झाली असावी. शतपथ ब्राह्मणात नाग माता कद्रू हिला पृथ्वीचे प्रतीक समजून पूज्य मानले आहे. सर्प वेध या नावाचा अथर्ववेदाचा एक उपवेद आहे. त्यात सर्पाचे विष उतरविण्यासाठी, त्यांना वश करण्यासाठी अनेक मंत्र सांगितले आहेत. करकोटक नागाचे स्मरण करणे हे पापनाशक आहे असे मानले जाते. नागांना संतुष्ट करण्यासाठी सर्पबळी , नागबळी इत्यादी विधी गृह्यसूत्र मध्ये सांगितलेले आहेत. अशाप्रकारे नागापासून आपले संरक्षण व्हावे, या उद्देशाने प्राचीन काळापासून नागपूजा भारतात प्रचारात आली आहे.

जगभरातील सर्वच प्राथमिक धर्मामध्ये व आदिम समाजांमध्ये नागपूजा प्रचलित असल्याचे आढळते. भारतात सर्वत्र नागपूजा प्रचलित आहे. वेदपूर्व काळापासून भारतात नागपूजा प्रचारात होती. मोहोनजोदाडो येथील उत्खननामध्ये सुद्धा नाग मूर्ती आढळल्या आहेत. नाग विषारी असल्यामुळे मनुष्याला त्याची फार भीती वाटते. ऋग्वेदामध्ये नागाचा उल्लेख 'अहि' या शब्दाने केला असून तेथे त्याची क्रूर, घातकी व भयंकर असे वर्णन केलेली आहेत. नागाची स्तुती करून त्याला वश करून घेतले तर त्यापासून भय राहणार नाही. या कल्पनेने यजुर्वेदात नाग स्तुतीपर मंत्र आढळतात. नागपूजा नागापासून वाटणाऱ्या भयातून सुरू झाली असावी.
१) देवता गंधर्व अप्सरा हे सात्विक प्रकारात येतात.
२) यक्ष, किन्नर आणि दैत्य हे राजस प्रकारांमध्ये मोडतात
३) राक्षस, नाग, प्रेत हे तामस प्रकारांमध्ये मानले जातात.
भारतीय साहित्यात नाग हा शब्दप्रयोग देवत्व प्राप्त झालेल्या सापांसाठी वापरला असावा असे वाटते. श्रीमद् भगवद् गीतेतील दहाव्या अध्यायात २८ आणि २९ व्या श्लोका मध्ये सर्प आणि नाग असे वेगवेगळे शब्द आलेले आहेत. काही जण अनेक फणा असलेल्यांना नाग, तर एक फणा असलेला सर्प असे मांनले आहे. महाभारतातील आस्तिक उपाख्याना नुसार हे समानार्थी शब्द असावेत असे वाटते. नाग आणि सर्प यात विषधर आणि विषहीन असाही भेद असावा असे काही जणांचे म्हणणे आहे. नागवंशी हा शब्दप्रयोग त्या राजवंश यांनी केला असावा जे स्वतःचा वंश नाग माता - पित्यापासून निर्मित मानतात. किंवा जे नागपूजेशी संबंधित आहेत त्यांनाही नाग लोक म्हणत असावेत. काहीही असले तरी शेवटी भारतीय राजनेतिक इतिहासात नागांचे महत्त्वपूर्ण योगदान राहिलेले आहे.




पश्चिम बंगालमधील रुबीन म्युझीयम ऑफ आर्ट मधील पाल काळातील १२ व्या शतकातील मनसा देवीची मुर्ती
वेद, महाकाव्ये, सूत्रे आणि इतर अनेक साहित्यासारख्या प्राचीन भारतीय धर्मग्रंथांमध्ये नाग पूजा पंथाचे असंख्य संदर्भ आहेत. ऋग्वेदात नागाची पूजा सुरुवातीच्या टप्प्यात होती तर, यजुर्वेदात ती नियमित उपासना बनली, ज्यामध्ये यज्ञांच्या विविध वस्तू अर्पण केल्या जात होत्या. शतपथ ब्राह्मणात नाग माता कद्रू हिला पृथ्वीचे प्रतीक समजून पूज्य मानले आहे. सर्प वेध या नावाचा अथर्ववेदाचा एक उपवेद आहे. त्यात सर्पाचे विष उतरविण्यासाठी, त्यांना वश करण्यासाठी अनेक मंत्र सांगितले आहेत. ऋग्वेदिक संज्ञा अहि बुध्यान, ज्याचा अर्थ "अखिल सर्प" असा होतो, अथर्ववेद नाग पूजेची अधिक तपशीलवार माहिती देतो आणि सापांविरुद्ध अनेक पुजा आणि मंत्रांनी भरलेला आहे आणि अग्रायण/मार्गशीर्ष महिन्यातील पौर्णिमेच्या दिवशी नाग देवतेची कृपा मिळविण्यासाठीच्या विधीचे देखील वर्णन आहे. अथर्ववेदात अनेक सर्प देवतांची नावे (जसे की असित, राभ्रू, कैरत, पृष्ण, अपोडक, तैमाता, इत्यादी) वेगवेगळ्या संदर्भात उल्लेख आहेत आणि कधीकधी त्यांना गंधर्व, यक्ष (पुण्यजन), अप्सरांसोबत संबध जोडलेला आहे.
गंधर्वपसरसः सर्पांडेवनपुण्यजननपितृण |
असे पाच सर्प देवता तिरश्चिराजी, प्रादकु, स्वजो, कल्मासाग्रीवो आणि स्वित्रो हे दक्षिण, पश्चिम, उत्तर, पूर्व आणि उर्ध्व दिशांचे रक्षक मानले जातात. अथर्ववेदात विशाळाचे वंशज म्हणून वर्णन केलेल्या प्रसिद्ध तक्षकाचा पहिला उल्लेख आहे (तक्षको वैशालेयो). महाकाव्यांमध्ये (महाभारत आणि रामायण) देखील नागांचे विविध प्रकारे संदर्भ आहेत. इरावंतचा पुत्र धृतराष्ट्र हा विराज (ब्रह्मांड) मधील विष (नागांचे निर्वाह) दुध करणारा होता असे म्हटले जाते आणि महाभारतात नागांपैकी सर्वोत्तम म्हणून त्याचा उल्लेख आहे. महाभारतात मणिमत नावाच्या आणखी एका नागाचा उल्लेख आहे, जो सापांच्या फण्यावर रत्ने असतात या श्रद्धेला अधोरेखीत करतो. ही श्रद्धा प्राचीन आहे आणि वराहमिहिर म्हणतात त्याप्रमाणे "तक्षक आणि वासुकी वंशातील साप आणि इच्छेनुसार फिरणारे साप (कामग) यांच्या फण्यावर चमकदार निळ्या रंगाचे मोती असतात" (बृहत्संहिता,)
करकोटक नागाचे स्मरण करणे हे पापनाशक आहे असे मानले जाते. नागांना संतुष्ट करण्यासाठी सर्पबळी , नागबळी इत्यादी विधी गृह्यसूत्र मध्ये सांगितलेले आहेत. अशाप्रकारे नागापासून आपले संरक्षण व्हावे, या उद्देशाने प्राचीन काळापासून नागपूजा भारतात प्रचारात आली आहे. लोक धर्मात नागांचा उल्लेख अर्धमानव रूप आणि इच्छेनुसार कोणतेही रूप धारण करणारा अशी ही तयार झाली. लोकपरंपरेत नाग पूजनाची असलेल्या प्रबळ लोकप्रियते मुळे नाग शिव, बौद्ध आणि जैन तीर्थनकार सारख्या महत्वपूर्ण देवते सोबत संबंध जोडला गेला. ही प्रक्रिया शुंग - कुशान काळापर्यंत पूर्ण झाली होती. सृष्टीच्या संहार कार्याशी संबंधित म्हणूनच शिवाच्या गळ्यात तसेच हातातील भूषणाच्या रूपात नागाला विशिष्ट स्थान प्राप्त झाले. शिवा सोबत असलेला नाग हा काल किंवा मृत्यूचा सूचक म्हणून एक चेतावनीच्या रूपाने पाहता येते. बौद्ध परंपरेत नंद, उपनंद् आणि मुचलिंद या नागांचा उल्लेख येतो. तर जैन परंपरेत सुपार्श्वनाथ आणि पार्श्वनाथ यांचे लांछन नाग आहे. पार्श्वनाथाची यक्ष, यक्षिणी हे सुद्धा नागराज धरणेद्र आणि त्याची राणी पद्मावती यांच्या रूपाने आहेत. मथुरा, भरहुत, सांची आणि अमरावती येथे शुँग, कुषाण, सातवाहनकालीन बौद्ध स्तूपावर नागांचे प्रचुर अंकन मिळते. नागवंशीय शासकांमध्ये आपल्याला छिंदक नागवंशी, फणी नागवंशीय अश्या काही राजघराण्याचे उल्लेख आढळतात.
वैदिक आणि उत्तरवैदिक देवतांमध्ये नागांना खूप महत्त्व होते आणि गृह्य सूत्रांमध्ये सर्पबली नावाच्या विधीचा समावेश आहे, जो पावसाळ्यात चार महिने चालणारा वार्षिक विधी होता आणि विशेषतः दोन कारणांसाठी साजरा केला जात असे: नागांचा सन्मान करणे आणि त्यांच्यापासून सर्व वाईट गोष्टी दूर करणे. अष्टनाग (तक्षक, वासुकी, अनंत/शेष, कर्कोटक, शंखपाल, गुलिका, पद्म आणि महापद्म), आणि मनसा (सापांची देवी, जी आजही पश्चिम बंगाल आणि ओडिशामध्ये खूप लोकप्रिय आहे) यांची पूजा करण्याची परंपरा पावसाळ्यात आणि नागपंचमीच्या दिवशी (श्रावण महिन्यात) सर्पबली विधीचा आधुनिक काळातील एक भाग आहे.

हिंदू धर्माव्यतिरिक्त, बौद्ध, जैन, शीख आणि इतर स्थानिक आणि प्रादेशिक पंथांमध्ये नागांना महत्त्वाचे स्थान मिळाले आहे, जे त्यांच्या धार्मिक स्मारके, शिल्पे, चित्रे, साहित्य, परंपरा आणि लोककथांवरून स्पष्टपणे दिसून येते. बौद्ध ग्रंथ कुल्लवग्गा (श्लोक ६) मध्ये सर्प राजांच्या चार जमातींची नावे आहेत: विरुपाक्ष, एरापथ (एलापात्र), चाब्यपुत्त आणि कान्हागोतमक, ज्यापैकी पहिले दोन अनेक बौद्ध ग्रंथांमध्ये प्रसिद्ध आहेत. बौद्ध ग्रंथांमध्ये मुकालिंद, अपलाल, कालिया इत्यादी नागा प्रमुखांचा देखील उल्लेख आहे जे सर्व वेगवेगळ्या संदर्भात बुद्धांना आदर देतात. त्याचप्रमाणे मथुरेत नागा कालियावर कृष्णाचा विजय, अधिक प्राचीन नागा पंथावर कृष्ण पंथाच्या (वैष्णव धर्म) वर्चस्वाबद्दल बोलतो.

विशेष म्हणजे, भारतातील ब्रिटिश सरकारने तयार केलेल्या १८९१ च्या जनगणनेच्या अहवालात देशाच्या विविध भागांमध्ये सर्पपूजकांच्या प्रभावाचा आणि संख्येचा तपशीलवार उल्लेख आहे. त्या वेळी "आग्रा आणि अवध या संयुक्त प्रांतांमध्ये नागाचे ३५,३५६ आणि सर्प नायक गुगा पीरचे १२,२९९१ उपासक होते, तर पंजाबमध्ये ३५,३४४ उपासक गुगाची पूजा करत होते,"१ जेम्स फर्ग्युसन यांनी त्यांच्या "ट्री अँड सर्पेंट वॉर्पिशप" या पुस्तकात मणिपूर आणि संबलपूर (ओरिसा) मध्ये जिवंत सापांच्या पूजेबद्दल लिहिले आहे. कालिकत येथील एका सर्प मंदिरात पुजारी आणि उपासकांकडून अनेक जिवंत नाग ठेवले जात होते ज्यांची काळजी घेतली जात होती. सापांचे काळजीपूर्वक संरक्षण केले जात होते . पूर्वजांच्या आत्म्यांचे प्रतिनिधित्व करणारे म्हणून त्यांची पूजा केली जात होती.
आता नागपंचमीच I
नाग आल्याची खेळायला |
मी ग भैय्याला सांगयितु
बारा सणाला नेऊ नको |
पंचमीला र ठेवू नको |
तर
पंचमीचा सण आला डोळे माझे ओले
बांधिले ग सख्यांनी झाडाला हिंदोळे ( तारा भवाळकर, लोक संचित )
हे सारे नाग पंचमीचे महत्व अधोरेखित करतात.
ऋग्वेद, यजुर्वेद, अथर्ववेद, गृह्यसूत्र, रामायण, महाभारत, मैत्रेयी सहिता आणि पुराणात नागांचे अनेक उल्लेख आढळतात. ते ही वेगवेगळ्या समानार्थी शब्दाने. नाग पूजेच्या संदर्भाने भारतीय साहित्यात विविध विधी सांगितलेल्या आहेत. अथर्ववेदात नागाला चारी दिशांचा दिक्पाल म्हटलेले आहे. ललितविस्तार या बौद्ध ग्रंथात नागाला लोकपाल रुपात मान्यता दिलेली दिसते. नागराजा तक्षकाने स्वेच्छेने राजा परिक्षितला दंश केला नव्हता. तर ऋषीच्या शापाला पूर्ण करण्यासाठी तो दंश होता. असे नारदाने परीक्षित पुत्र जनमेंजय यास सांगून सर्पसत्र किंवा नागयज्ञ बंद करावयास लावला. त्यावेळी राजा जन्मेजय याने प्रायश्चित करण्याची तयारी दर्शविली. तेव्हा नारद मुनी ने सांगितले की, " सामूहिक रुपाने तुझ्या प्रजेने प्रतिवर्ष नागांची पूजा करावयास हवी. " असे म्हणतात की तेव्हापासून नागपंचमीला सुरुवात झाली. नाग संबंधी अनेक मिथके आपल्याला पाहावयास मिळतात. पंचतंत्राच्या कथित नागा संबंधी भरपूर लिखाण आढळून येते. नल दमयंती कथेत ही नल राजाने नागाची केलेली प्राण रक्षा आणि त्यातून नागाने केलेले सहकार्य वाचावयास मिळते.
नाग किंवा साप यांना लैंगिक भावनेचे प्रतीक मानण्यात येते. ज्यावेळी एखादा साप खांबाला वेढा देऊन बसतो तेव्हा तो खांब प्रेरित झालेले लिंग वाटतो. साप हा पुरुषवाचक शब्द म्हणून वापरला जातो. या सरपटणाऱ्या प्राण्यात लिंगाची रचना असल्यामुळे ते वासनेचे प्रतीक आहे. त्यासाठी त्याला वैशेयिक मन, संभोग इच्छा आणि संभोग इच्छा कमी होणे इत्यादीचे प्रतिनिधित्व सरपटणारे प्राणी करतात. ज्या वेळी स्त्री व पुरुष उत्तम परिस्थितीत व तंदुरुस्त शरीराने एकमेकांकडे आकर्षित होतात. त्यावेळी त्यांच्या लिंगाची व योनीची स्थिती एखाद्या वळवळणाऱ्या प्राण्या सारखी होते. ग्रीक कथेत एडम व इव्हा यांच्याजवळ साप हे प्रतीक यामुळेच दाखवण्यात येते. प्रसिद्ध मनोवैज्ञानिक सिगमंड फ्रॉइड याने सुद्धा नागाला काम प्रतीक मानले आहे. त्यांच्या मतानुसार, आदिम समाजातील स्त्रिया नागाची पूजा काम प्रतिकाच्या रूपानेच करत असत. कदाचित यामुळेच जगभरात आणि विशेषतः भारतामध्ये नागपूजा या स्त्रियाच करतात. नागाची पुत्रप्राप्तीसाठी आराधना करणे किंवा शिवा सारखा श्रेष्ठ पती मिळावा यासाठी शिवपूजन करणे या पाठीमागे ही कामभावना प्रेरित असावी असेही मानले जाते. वांझ स्त्रिया पुत्र प्राप्ती साठी नागशिळेची पूजा करतात. नागाच्या काम रूपा संदर्भाने कश्मीरी लोक कथेनुसार, सुरिनसर किंवा सुनासर ही झील अध्यात्मिक बाबतीत पवित्र मानली जाते. हा संदर्भ महाभारत काळाशी जोडला जातो. वनवासात असतांना पांडव जम्मू येथे गेले होते. ज्यावेळी नागकन्या उलुपी सोबत अर्जुनाचा विवाह झाला होता. तसेच माणिपूर राज्याची राजकन्या चित्रगंधा हिच्यासह ही अर्जुनाने विवाह केला होता. कालांतराने त्यांना बब्रुवाहन नामक वीर पुत्र जन्माला आला. अर्जुनाचे वास्तव्य तिथे अल्पकाळ असल्याने पुत्र जन्माची वार्ता अर्जुना पर्यंत पोहोचली नाही. महाभारताच्या युद्धसमाप्तीनंतर पांडवांनी अश्वमेध यज्ञ केला होता. यज्ञाचा अश्व बब्रुवाहन यांनी रोखून धरला होता. तो सोडविण्याचा प्रयत्न अर्जुनाने केला असता. युद्ध कौशल्यात अर्जुन कमी पडला. त्यामुळे अर्जुनाला मूर्च्छा आली. ही वार्ता चित्रगंधा हिला कळाली असता ती रणभूमीवर आली आणि पुत्र बब्रुवाहन यावर ती क्रोधित झाली. वडिलाला जिवंत करण्यासाठी बब्रुवाहन यांनी वैद्यची मदत घेतली. वैद्यांनी उपचार सांगितला की, पाताळ लोकातून नागमणी (वनौषधी) आणावी लागेल. त्यासाठी बब्रुवाहन याने पाताळ लोकात बाण मारला. त्या बाणाने इच्छित नागमणी आणला. त्या साठी नागकन्या उलुपीने साह्य केले. त्या नागमणीच्या सह्याने अर्जुन जागा झाला. ज्या मार्गाने बाण गेला आणि ज्या मार्गाने बाण परत आला तिथे दोन्ही बाजूने झील तयार झाली असे मानले जाते. तेव्हा पासून नवविवाहिता या झीलची तीन वेळा परीक्रमा करून नाग देवतेचा आशीर्वाद घेऊन वैवाहिक जीवनाला प्रारंभ करते.

नागाचे संतान दायी सामर्थ्य भारतीय जनमानसातील अनेक धारणांमधून व्यक्त होत असते. दक्षिणेतील सर्व प्रमुख क्षेत्रपाल देव आपले नागरूपात्व सांभाळून आहेत. ग्रामीण भागातून आजही अशी दृढ समजूत आहे की, एखाद्या गर्भवती स्त्रीने साप पाहिला असता, त्याचे तत्क्षणी डोळे जातात आणि ती स्त्री प्रसूत झाल्यावर तिच्या नान्ही घराचा गंध अनुभवल्यावर तो नाग पुन्हा डोळस होतो. ती गरोदर असताना त्या स्त्रीचा आणि पुरुषाचा संबंध येऊ नये किंवा समागम घडू नये, असा निषेध त्यात अभिप्रेत असावा. सर्व पुरुष नागाचे प्रतिनिधी आहेत आणि नाग हे पुरुषी तत्त्वाचे प्रतीक आहे. म्हणून वारुळाची पूजा भूमीच्या सृजनेंद्रीयचे प्रतीक म्हणून केली जाते. वारूळास पृथ्वीची योनी म्हणतात. योनी रूपिनी भुदेवी आहे. योनी प्रतीक म्हणून नैसर्गिक वारूळची उपासना अति प्राचीन काळापासून आजपर्यंत दक्षिण भारतात तरी अखंड प्रचलित आहे. वारूळ ही फारच नाजूक असल्यामुळे वारूळ सादृश्य घडीव शीला मूर्तीचे प्रचलन क्वचित कोठे असल्याचा पुरावा उपलब्ध आहे. वारुळाच्या शीला रूप प्रतिकृती नंतर नाभी पर्यंतच्या योनी मूर्ती घडविल्या जाऊ लागल्या. तसेच प्रसवा बरोबरच पोषणाचा ही मातृत्वाशी संबंध असल्यामुळे योनि प्रमाणेच स्थानांना उठाव देणाऱ्या स्कंदा पर्यंतच्या मूर्तीची निर्मिती होत गेली. भू देवीच्या सर्जक आणि पोषक इंद्रियांच्या मूर्तीचा हा वारूळ ते योनी - स्तन - युक्त मूर्ती पर्यंतचा क्रमविकास श्री रा. चि. ढेरे यांनी सिद्ध केला आहे.
कल्याणमल्ल, कोक्कोक, दीक्षित श्यामराज, श्री प्रोढदेवराज, मथुरा प्रसाद दीक्षित यांनी नायिकेच्या माणस प्रकृतीचा ही उल्लेख केलेला आहे. देव सत्वा, यक्ष सत्वा, मनुष्य सत्वा, पिशाच्च सत्वा, नाग सत्वा, काक सत्वा, वानर सत्वा आणि खर सत्वा असे प्रकार सांगण्यात आलेले आहेत. सत्व या शब्दाचा अर्थ शील असा होतो. अर्थात नायिकेच्या चारित्र्य आणि वागणुकीवरून हे सत्वाचे प्रकार दिलेले आहेत. त्यानुसार जी नेहमी एखादी घटना किंवा काम विसरते, विसराळू स्वभावाची जी नेहमी व्याकुल, घाबरलेली असते, सापाप्रमाणे दीर्घ श्वास घेणारी, नेहमी निद्राधीन राहणारी, नेहमी जांभळी देणारी ती नाग सत्वा जाणावी. असे म्हंटले आहे.
वरील विवेचनावरून असे म्हणता येईल की,
१) सर्वच प्राचीन मानवी सभ्यतेत नागा विषयी भीतीतून आदरभाव निर्माण झाला.
२ ) नाग सादृश्यधिष्टीत कल्पनेच्या जोरावर सूर्या सोबत संबंध जोडून कथा निर्मिती केल्या गेल्या.
३ ) नाग हे अत्यंत जहाल विष बाळगून असल्यामुळे आमचाही वंश नागसम आहे. हे दाखविण्यासाठी कुळवंश प्रतिकाच्या रूपाने नाग हे 'कुलचिन्ह' म्हणून ज्या जमातींनी किंवा राज वंशानी स्वीकारले त्यास नागलोक या नावाने ओळखण्यात येते.
४ ) नागाची शरीर रचना ही पुरुष लिंगाप्रमाणे असल्यामुळे आणि वारूळ स्त्री लिंग अथवा भूमिचे / सृजनाचे प्रतीक म्हणून स्वीकारले गेले असावे.
५ ) दक्षिणेतील अनेक क्षेत्रपाल देवता आपले नागरूप प्रकट करताना दिसतात.
६ ) आशीर्वाद देत असताना हाताची मुद्रा ही पाच फडा असलेल्या शेषनागाची मुद्रा मानली जाते. यज्ञोपवीतातील एका सूत्राचे नाव नाग तंतू असे आहे.

भारताचे अतिशय प्राचीन नगर जे वायव्य सीमेवर भारताच्या प्रवेशद्वारावर वसलेले नगर म्हणजे तक्षशिला होय. जगातील विद्या अभ्यासाचं प्राचीनतम केंद्र, भारतीय लोक परंपरेनुसार ही नागराजा तक्षकाची नगरी. उत्तर प्रदेशातील अहिच्छत्र नगरी ही परंपरेने नागांची जोडल्या जाते. तिचे नावच अही म्हणजे नाग. हा तिचा नागाची संबंध सांगणारे आहे. मध्य प्रदेशात गोलियर जवळ हे शहर होते. प्राचीन पद्मावती नगरी ही पुराण प्रसिद्ध नगर. पुराणात येथील नागवंशी राज्यांची विस्तृत वर्णने आहेत. येथील नागसेन नामक राजाचा उल्लेख सम्राट हर्षवर्धन याचा राजकवी बाणभट्ट याने आपल्या हर्षचरित्रात केला आहे. नागद, नागपूर, नागापूर, नागग्राम, नागठाणा, नाग हल्ली, नागुर, नागझरी अशी नाग नामक गावे भारतात सर्व प्रांतात आहेत. हल्लीचे पद्म पवया हे ग्वालियर जवळ आहे. पूर्वी पद्मावती या नावाने प्रसिद्ध होते. येथे वृषनाग, भीम नाग, स्कंद नाग, वसू नाग, व्याग्र नाग आदी राजांची नाणी सापडली आहेत.
भारतातील एक प्राचीन वंश. भारतात नाग राजे फार प्राचीन काळापासून राज्य करीत असावेत पण त्यांचे फार थोडे उल्लेख आढळतात. अगदी प्राचीन काळापासून नागवंश अस्तित्वात आहे. त्यांची राज्ये लहान व विखुरलेली होती, पण ती प्रत्येक कालखंडात होती. नागवंश (Naga dynasty) भारताच्या प्रदीर्घ इतिहासाचा महत्त्वाचा साक्षीदार आहे. नागांचे पुसटसे उल्लेख वेदांमध्ये आढळतात;
शेष - अनंत या नावानेही शेष नागाचा ओळखले जाते. शेषनागाने गंधमादन पर्वतावर तपस्या केल्यानंतर ब्रह्माजीच्या वरदानाने पृथ्वीचा भार सांभाळण्याचे काम त्याच्याकडे सोपविण्यात आले. हरिवंश पुराणानुसार ब्रह्मदेवाने वासुकीला नागांचा राजा, तक्षकाला सापांचा राजा आणि शेषाला सर्वच विषदंती प्राण्यांचा राजा बनविला. यावरून शेषनागाचे महत्त्व सिद्ध होते. धार्मिक ग्रंथानुसार लक्ष्मण आणि बलराम शेषनागाचे अवतार रूप आहेत. हाच शेषनाग विष्णू चा सेवक म्हणून क्षीरसागरा मध्ये आहे. विष्णू विश्राम मुद्रेत शेष नागच्या वेटोळ्यावर झोपलेले असतात. श्रीकृष्ण जन्म समयी वासुदेव कृष्णाला यमुना पार करत असताना प्रचंड वर्षा होत होती. त्यावेळी शेषनागाने आपला फणा कृष्णा वर धरून यमुना पार करण्यास मदत केली होती.
वासुकी - हा समस्त नागांचा राजा. वासुकी हा शिवाच्या कंठास लपेटलेला असतो असेही म्हणतात. समुद्रमंथनाच्या वेळी दोरीच्या रूपाने वासुकीचा उपयोग केला गेला होता. शिवाच्या त्रिपुरांतक अवतारात शिवाने एकाच बाणात असुरांची तीन पुरे नष्ट केली होती. त्यावेळी धनुष्यबाणाची प्रत्येंचा वासुकी बनला होता. कथासरित्सागर या ग्रंथानुसार लता देशाचा राजा वासुकीच्या संबंधाने आदर भाव प्रकट करण्यासाठी प्रति वर्ष उत्सव करीत असे.
तक्षक - शृंगी ऋषीच्या शापाची अंमलबजावणी करण्यासाठी तक्षक नागाने राजा परीक्षिताला डसले होते. त्यामुळे तक्षकाचा बदला घेण्यासाठी परीक्षित पुत्र जनमेंजयने सर्प यज्ञ केला होता. तेव्हा सर्व साप यज्ञात येऊन पडू लागले. त्यावेळी आस्तिक मुनीने तक्षकाची रक्षा केली. तक्षकच शिवाच्या गळ्यात असलेला नाग आहे असे ही मानले जाते. तक्षकाचा पुत्र अश्वसेन पाताळात राहत असे. खांडव वन अग्निकांड पासून तो अर्जुनाचा विरोधी होता. त्यामुळे कुरुक्षेत्र रणभूमीवर अश्वसेन कौरवांच्या बाजूने सामील झाला होता. अथर्व वेदा नुसार तक्षक हा सर्वाधिक विष असलेला नाग होता असे म्हटले आहे. कौशिक सूत्रानुसार गृहरक्षे साठी तक्षका समोर बळी द्यावा असे म्हटले आहे. असे म्हटले जाते की, तक्षशिला येथे तक्षक संप्रदायाचा प्रभाव होता. मध्यप्रदेशात तक्षकेश्वर या नावाने इंदोर जवळ नवाली गावात एक मंदिर आहे.
करकोटक - यास शिवाचा गण असेही म्हणतात. हरिवंश पुराणात या नागाचा विशेष उल्लेख मिळतो. नल-दमयंती कथेतही करकोटक येतो. आपल्या आईच्या शापातून मुक्त होण्यासाठी महाकाल वनात शिवलिंगाची पूजा केली होती. राजा परीक्षिताचा मुलगा जनमेजयने नागयज्ञ करून सर्व सर्पांचा वध केला.ज्यामध्ये वासुकी, तक्षक आणि कर्कोटक हे साप वाचले होते. इंद्राने वासुकी आणि तक्षकांचा बचाव केला, तर कर्कोटक उज्जैनमधील महाकालच्या आश्रयामध्ये राहून जिवंत राहिले.
कालिया - याचा निवास आपल्या कुटुंबासह यमुना नदी मध्ये होता. त्यामुळे यमुने मध्ये विष पसरले होते. कृष्णाने कालियाला युद्ध करून यमुना सोडण्यास भाग पाडले.
खांडववनात जेव्हा आग पेटली होती तेव्हा अश्वसेन नावाचा नाग वाचून गेला होता ज्याला अर्जुनाशी बदला घ्यायचा होता.
चित्रस्रोत: गुगल- अश्वसेन - अर्जुन युद्ध.
चित्रस्रोत: गुगल -पद्मनाग
नवनागस्तोत्र :
शंखपालं धृतराष्ट्रं तक्षकं कालियं तथा॥
एतानि नवनामानि नागानां च महात्मनाम्।
सायंकाले पठेन्नित्यं प्रात:काले विशेषत:।
तस्य विषभयं नास्ति सर्वत्र विजयी भवेत्॥
॥ इति श्री नवनागस्तोत्रं संपूर्ण ॥
नागशिल्प –
संपूर्ण भारतात तुम्ही कुठे ही गेलात तर तुम्हाला नागशिल्प बघायला मिळतात आणि आज त्याच नागशिल्पांना आपण प्रत्येक नागपंचमीच्या सणाला पुजतो. गावोगावी दिसणाऱ्या ह्या नागशिल्पांचा नेमका अर्थ आपल्याला प्राचीन भारताच्या इतिहासातून मिळतो. भारताचे नैसर्गिक स्थान , समृद्धता ह्यामुळे भारतावर कायमच आक्रमण होत राहिले. उत्तरेकडून होणारी आक्रमणं मोठ्या प्रमाणावर होती. सिंध प्रांत, खैबर खिंड इथून आक्रमणांचे येणारे लोंढे नागराजांकडून रोखले जायचे.राज्यक्षेत्र जरी वेगवेगळी असली तरीही कोणावर ही परकीय शत्रू चालून आल्यास एकीचे बळ दाखवत शत्रूस तोंड देण्याचे काम ह्या राजांनी केले आणि आपले साम्राज्य अबाधीत ठेवले. कालांतराने पंचक्रोशीत शूर राजे असे नाव कमवून नागराजांनी जनतेच्या मनात खास अशी जागा निर्माण केली. ‘नाग’ हा वंश म्हणून ओळखला जाऊ लागला आणि संपूर्ण भारतभर नाग वंशाचा प्रचार होऊ लागला. नाग लोक जेव्हा आपल्या धर्मप्रचारासाठी संपूर्ण भारतभर भ्रमण करत होते तेव्हा त्यांनी आपल्या राजांची आठवण म्हणून मोठ्या मोठ्या शिळांवर
पाच राजांची प्रतिमा कोरली. कालांतराने बदल होत गेले पाच नागराजांचे प्रतीक असलेले नागशिल्प तीन , दोन आणि एक अश्या स्वरूपात कोरण्यात येऊ लागले. मध्ययुगीन काळात ह्याच नागशिल्पाचा वापर मंदिरांवर सुद्धा करण्यात आला. चपळता दर्शवण्यासाठी प्रतिकात्मक शिल्प म्हणून वापर करण्यात आला. ह्यात काळानुसार अनेक बदल होत गेले आणि नागपंचमी ह्या सणाला हीच नागशिल्प जी कधीकाळी नागराजांची आठवण होती नागपंचमीच्या सणाला पुजली जाऊ लागली.
भारतीय कलेने भावना प्रकट करण्यासाठी प्रतीकांना जन्म दिला. जसे नाग कश्यप आणि कद्रू यांचे पुत्र असल्याचे पुराणात उल्लेख आहेत. पौराणिक नाग लोकांमधील अनंत, वासुकी, शेष हे नाग मानवा अनुकूल होते. तर तक्षक, कारकोटक, कालिया हे मानव वैरी होते. नाग हा वारूळात राहतो आणि वारूळ हे भू देवतेचे प्रतीक मानले आहे. त्यामुळे भूमीच्या सृजन शक्तीशी त्याचा संबंध जोडला गेला. शिव आणि विष्णु या दोघांचाही नागाशी संबंध आहे. नागफणी धारण करणारी कालिकादेवी आहे. त्याचप्रमाणे गणेशाच्या पोटावर ही नागबंध आवळलेला असतो. कंसाच्या कैदेतून बाहेर पडल्यानंतर पावसापासून रक्षण करण्यासाठी वासुकी नागाने कृष्णावर फना छत्र धरलेले होते. बुद्धांच्या जन्मानंतर नंद व उपनंद या नागांनी स्नान घातले होते. तर ज्ञान प्राप्ती नंतर मुचलिंग नागाने त्यांच्यावर आपला संरक्षक असे फनाछत्र धरले होते. जैन तीर्थंकर पार्श्वनाथ यांचे नाग हेच अभिज्ञान चिन्ह आहे. कामठा किंवा मेघमालि हा पूर्वजन्मीचा पार्श्वनाथाचा भाऊ जो वैरी बनला होता. त्याच्या हल्ल्यापासून यक्ष धरणेद्र हा आपल्या सात फण्याचे छत्र पार्श्वनाथच्या डोक्यावर धरले असल्याचे शिल्प वेरूळ लेणीत आहे.
श्रवणबेलगोळ येथील गोमटेश्वराच्या प्रचंड मूर्ती भोवती अनेक वारुळे निर्मिले असून त्यातून नाग बाहेर येत आहेत असे शिल्पात दाखवले आहे. नाग हे योगाचे ही प्रतिक मानले जाते. त्या कारणाने शिवाची योगी राजत्व दाखविण्यासाठी नाग शिवा जवळ सातत्याने दाखविला जातो. अशी ही पौराणिक मान्यता आहे.
शिल्प शास्त्रातील नागाचे महत्व :
हिंदुधर्मात भुतदयेवर भर दिलेला दिसतो. इथ सर्व प्राण्यांना योग्य ती वागणूक दिली आहे. गावागावात आपणाला नागाचे शिल्प दिसून येते. मंदिराचा आवार असो किंवा गावातील पार एखादे तरी नागशिल्प असतेच. महादेवाने नागाला आभूषण म्हणून धारण केले आहे तर विष्णूने त्याची शय्या बनवली आहे तसेच गणपतीने नागाला पोटाभोवती गुंडाळले आहे. देवतांच्या विविध मूर्तीमध्ये नाग दिसतो. मंदिरावर शक्यतो तीन, पाच किंवा सात फण्यांचा नाग दिसतो. नाग जोडी असेल तर त्याला नागमाता म्हणतात. मंदिर बांधकामात भैरवयंत्र, योगिनीयंत्र, नागबंध असे काही शास्त्र वापरले जातात. मंदिर बांधकामांसाठी कोणता काळ योग्य आहे हे ठरवण्यासाठी देखील नागाचा वापर होतो.
मंदिर बांधकामांसाठी कोणता काळ योग्य आहे हे ठरवण्यासाठी देखील नागाचा वापर होतो. बांधकामाचा पाया खणण्यासाठी खालील संकेत देण्यात आला आहे
नागवास्तुं समालोक्य कुर्यात् खातविधिं सुधीः ।
पाषाणान्तं जलान्तं वा ततः कूर्म निवेशयेत् ॥
नागवास्तुची स्थिती बघून त्याप्रमाणे शहाण्याने पाया खणण्यास सुरूवात करावी. पाया मजबूत पाषाणापर्यंत किंवा भूगर्भान्तर्गत पाण्याच्या पातळी पर्यंत खोल खणावा व तेथे कूर्माची स्थापना करावी.

भाद्रपद, अश्विन व कार्तिक महिन्यांत नागाचे डोके पूर्व दिशेकडे असते. या तिमाहीच्या पहिल्या दिवशी नागाचे डोके बरोबर ईशान्य दिशेकडे असते व शेवटच्या दिवशी ते आग्नेय दिशेकडे असते. अशा रीतीने नागाचे डोके एका दिवसाला एक अंश असे प्रदक्षिणा क्रमाने फिरते.

शिल्पप्रकाश नुसार पूर्व दिशेकडील तोरण सर्वसाधारणपणे यश देणारे असते. वास्तुची पूजा इत्यादी श्रावण तसेच भाद्रपदात करू नये. मार्गशीर्ष व पौष महिन्यात नागाचे डोके दक्षिणेकडे असते. हा शाखाच्या मताने यथायोग्य शुभ काल असतो. त्यावेळी नागबन्धाला अनुसरून शंकूची स्थापना करणे उत्तम असते. त्यानंतर प्रासादाच्या समितीची स्थापना करण्यासाठी (पायासाठी) खड्डा खोदावा.
नाग आपल्या शरीराने मध्यबिंदूपाशी २७० अंशांत फिरलेला असतो व ९० अंशांचा भाग सोडून दिलेला असतो. शिल्पसारणींत या नागाला गृह-नाग म्हटले आहे, कारण देवालयाच्या दरवाजाची दिशा त्याच्या (मुखाच्या) स्थानावरून निश्चित केली जाते. देवालय त्याच्या छातीपाशी असून देवालयाची लांबी त्याच्या शेपटीच्या दिशेकडे असते, त्याचे डोके ज्या दिशेला असेल त्या दिशेला दरवाजा ठेवतात. या सापास काल-सर्प देखील म्हणतात. त्यास ३६० हाडे (दिवस व रात्री), ६ अवयव (ऋतू), १२ वळसे (महिने) असतात.त्याच्या शरीराचा वरचा गडद रंगाचा भाग रात्र व खालचा फिक्या रंगाचा भाग दिवस दर्शवितात. अशा रीतीने एक वर्षाचा कालावधी या नागाने दर्शविला जातो.
१ ) पहिल्या स्वरूपात सर्प अनेक डोके असलेला आहे.
२ ) दुसऱ्या प्रकारात, तो बहुमुखी सर्पाच्या फणीसह मानवी स्वरूपात दाखवला आहे.
३ ) तिसरा प्रकार दोन्ही एकत्र करतो, जिथे वरचा भाग मानवी शरीराचा आहे तर खालचा अर्धा भाग गुंडाळलेल्या सापाचा आहे.
हडप्पा संस्कृतीतील उत्खननातून मिळालेल्या माहितीवरून हे स्पष्ट होते की, नाग लोक भारतीय धार्मिक परिस्थितीत सुरुवातीच्या काळात दिसतात. त्यापैकी मोहेंजोदारोमधील दोन ठसे आहेत ज्यात योगासनात बसलेल्या देवतेचे चित्रण आहे, ज्यामध्ये दोन्ही बाजूला दोन गुडघे टेकलेल्या आकृत्या आहेत आणि प्रत्येक आकृतीच्या मागे एक सापाचे डोके उंचावलेले आहे ज्यावर पसरलेला फणा आहे. याशिवाय, हडप्पाकालीन मातीच्या भांड्यांवर साप रंगवलेले आढळले आहेत आणि एक मातीचा कंठा सापडला आहे ज्यावर एका आसनाच्या खालच्या बाजुला एक सापाची आकृती दिसते.
आयुध रूपातील नाग प्रतीक :-
बहुतांश देवतेसमोर नाग हे चिन्ह आयुध म्हणून दाखवण्यात येत असले तरी, प्रत्यक्षात शिवा सोबत सर्प / नाग हे लांछान कायमस्वरूपी जोडले गेलेले आहे. प्रतिमा लाक्षणिक विवरण पाहता विष्णुधर्मोत्तर पुराण, मत्स्यपुराण, मानसार, मयमत, कामिकागम, अंशुमतभेदागम, देवता मूर्ती प्रकरण, आदी शिल्प शास्त्रीय ग्रंथात शिवाच्या आयुधात कृष्णमृग, खडग, खेटक, वज्र, परशु, त्रिशूल, खट्वांग, डमरू, पाश, हस्ती चर्म, दंड, कपाल, अक्षमाला, धनुष्य, शंख, चक्र, गदा आणि सर्प किंवा नाग सांगितला आहे.
ऐतिहासिक काळातील नागांच्या काही सुरुवातीच्या प्रतिमा भरहुत कठड्यावर (इ.स.पूर्व दुसऱ्या शतक ) एलापत्र आणि चक्रवाक यांच्या आहेत. दोन्ही पूर्ण मानव आहेत ज्यांच्या वर पाच फणा असलेले सापाचे डोके आहेत आणि अंजली ( नमस्कार करण्याच्या ) मुद्रेत बुद्धांना नमस्कार करताना दाखविले आहेत.
मथुरा परिसरातून कुशाण काळातील सापडलेल्या नाग प्रतिमा त्यांच्या भक्तांनी स्थापन केलेल्या असून नाग पंथाचा प्रभाव दर्शवितात. मथुरेजवळील चारगाव येथे सापडलेली एक नाग प्रतिमा ही एक सामान्य मुर्ती आहे ज्यामध्ये ७ फण्या आणि समोर दोन्ही बाजूंना सर्पाचे वेढे दिसतात. येथे नाग देवतेचे द्वैत स्वरूप म्हणजे बहुमुखी साप व उभ्या असलेल्या मानवाचे एकत्रित शिल्प दाखवले आहे. हे रूप आपण बलरामाचे पाहतो त्यासारखेच आहे. खरं तर अशा नाग मूर्तींना अजूनही गावांमध्ये पूजा केली जाते, परंतु त्यांना वेगवेगळ्या नावांनी जसे दौजी (मोठा भाऊ) किंवा बलदेव (बलराम) असे संबोधले जाते. कुशाण साम्राज्याच्या पतनानंतर नाग पूजा पंथ उत्तर आणि मध्य भारतात आणि आसपास पसरला जिथे त्यांना इतर सत्तांचा राजाश्रय मिळाला.नाग पूजेबद्दल तक्षशिला, पद्मावती, विदिशा, मथुरा, कांतिपुरा आणि अयोध्या येथे असंख्य शिलालेख, अंकशास्त्रीय आणि साहित्यिक पुरावे सापडले आहेत त्यावरुन या वस्तुस्थितीद्वारे पुष्टी मिळते कि येथे मोठ्या प्रमाणात नागपुजा होत होती.
विरसेन नावाच्या एका शासकाच्या (त्याची राजधानी मथुरा येथे होती) काही उपलब्ध नाण्यांवरून, सिंहासनावर एक सर्प उभा असल्याचे दिसून येते, ज्यावर एक स्त्री आकृती बसलेली आहे (ही देवी गंगा असू शकते) तिच्या उजव्या हातात कलश धरून आहे. कुमुदासेन, धनदेव आणि विशाखदेव (इ.स.पू. १५० ते १०० दरम्यान अयोध्येचे राजे) या तीन राजांच्या नाण्यांवर सापांचे प्रतीक म्हणून चित्रण केले आहे.



चारगाव येथील दुसर्या शरकातील कुषाण सम्राट हुविष्क सिर्का सेनाहस्ती-भानुका यांच्या चाळीस वर्षाच्या काळातील उभी ( स्थानक ) नाग देवाची मुर्ती

कांचीपुरम येथील नाग शिळा



केरःळमधील थिसुर येथील सक्तानथंवरन राजवाड्यातील सर्प कावु
दक्षिण भारतात आजही नाग उपासनेचे अस्तित्व अधिक आहे याचे कारण म्हणजे कवु किंवा सापांशी संबध असलेली झाडे (उत्तर भारतातील नागवन सारखी) आढळतात ज्यांना विशाट्टम कवु किंवा विष मंदिर किंवा नागकोट्टा म्हणून ओळखले जाते. दक्षिण भारतात प्राचीन काळापासून नाग पूजा प्रचलित होती हे कन्नारमध्ये लिहिलेल्या बनवासी येथील शिलालेखावरून कळते, ज्यामध्ये इ.स. पहिल्या शतकाच्या मध्यात सापाच्या मुर्तीची उभारणी झाल्याची नोंद आहे. दक्षिण भारतातील जवळजवळ सर्व गावांमध्ये सापाची मुर्ती अजूनही दिसतात आणि हि शिल्प मंदिर संकुलात किंवा अस्थव वृक्षाखाली किंवा मोठ्या मंदिर संकुलात स्वतंत्र देवस्थान म्हणून देखील दिसतात.
बाजारपेठेतील_शिळेवरील_शेषनाग
किल्ले रायगडवर हुजूरबाजाराची म्हणजेच बाजारपेठ बसवून नुकतीच सुरुवात झाली होती, आता हिंदुस्तानातील अनेक व्यापारांना अभय देऊन आणि सन्मानाने आमंत्रण देऊन त्यांना या बाजारपेठेत स्थायिक करणे गरजेचे होते. कारण तसे न केल्यास परकीय शत्रुंना यांचा गैरफायदा घेणे सोयीचे झाले असते. यासाठी महाराजांना कोणीतरी सन्माननीय आणि भरवशाचा व्यक्ती आवश्यक होता जो ह्या बाजारपेठेचा संपूर्ण कारभार बघेल आणि सर्व व्यापाऱ्यांचा विश्वास जिंकून घेईल, तेव्हा शिवरायांना आठवण झाली ती म्हणजे बाबाजीनाईक पुंडे यांची. नगर जिल्हातील श्रीगोंदे येथील परंपरागत सावकार घराण्यातील बाबाजी शिवरायांच्या पदरी सन्मानाने आश्रित होते. विजापूरच्या आदिलशाहीशी शिवरायांच्या झालेल्या तहानुसार ते विजापूर दरबारी १६६७ पासून स्वराज्याचे वकील म्हणून काम पाहत होते. १६७२ मध्ये तह मोडल्यामुळे ते पुन्हा विजापूर येथून निघून रायगडावर येण्यास निघाले. श्रीगोंदे येथील नाईक यांचा परंपरागत सावकारीचा पेशा असल्यामुळे महाराजांना यांची बाजारपेठेसाठी सावकार किवा महाजन पदी नियुक्ती करणे सोयीस्कर ठरले. कारण कोणा लबाड लांडगा, शत्रूचा हेर यास गाळा देऊन बाजारपेठेत निवास देणे धोक्याचे होते. त्यावेळी बाबाजीनी विचार केला, छत्रपती शिवाजी महाराजांच्या आश्रयाखाली त्यांना हे सोन्याचे दिवस लाभले आहेत ते फक्त आणि फक्त त्यांच्या आजोबांमुळे “शेषाबानाईक पुंडे”. बाबाजीना ही आपल्या आजोबांची पुण्यायी वाटू लागे. त्यामुळेच बाबाजीनी आपल्या आजोबांचे ऋण लक्षात घेऊन ७ व्या किवा ८ व्या दुकानाच्या मधल्या शिळेवर शेशाबाची स्मृती म्हणून त्यांनी “शेषनाग” कोरवुन घेतला. यापुढे बाबाजीनाईक यांचे अस्तित्व दर्शवणारा तो शेषनाग हुजुरबाजाराचे वैभव दर्शवू लागला. आजही आपण त्या बाजारपेठेत फेरफटका मारताना त्या शेषनागाच्या शिळेजवळ क्षणभर थांबतो आणि त्याचे दर्शन घेतो. आपण जर नीट निरीक्षण करून पाहिल्यास असे दिसते कि हा एक फणा असलेला साधा नाग नसून छोटे छोटे असे सात फणे असलेला शेषनाग आहे. भोसले घराण्याशी प्रामाणिकता दर्शवणाऱ्या शेषाबानाईक यांची ती स्मृती आहे...!
नाग स्थापत्य कलेचे अनुपम उदाहरण - मामा भांजा मंदिर ....!
संस्कृती नागपूजनाची
केवळ रायगडच नव्हे तर संपूर्ण भारतात नागपूजन होत असते. सध्याच्या काळात जसा नागपंचमी हा सण साजरा होतो, तसा प्राचीन काळात नागांचा उत्सव ‘नागमह’ नावांने साजरा होत असे. हजारो वर्षांत नागपूजेचे केवळ स्वरूप बदलत आले, पण मूळ गाभा तसाच आहे. यक्षपूजेप्रमाणेच नागपूजेचाही हिंदू, जैन आणि बौद्ध धर्माशी समन्वय दिसून येतो. नागांना या धर्मांत उपदेवतांची स्थाने मिळाली. मथुरेजवळील सोंख येथे डॉ. हर्बट हर्टल यांनी जे उत्खनन केले त्यात तेथे कुषाणकाळांतील म्हणजे अंदाजे दुसऱ्या शतकातील एक सुंदर नागमंदिर असल्याचा पुरावा हाती आला. हे नागमंदिर विटांचे असून अर्ध-लंबवर्तुळाकार होते. याच परिसरातून अप्रतिम कलाकृती असलेली नागशिल्पेही मिळाली. यावरून मथुरा हे कुषाण काळात नागपूजेचे एक मोठे केंद्र असल्याचे सांगता येईल. या काळांतील सुरूवातीच्या मूर्तींमध्ये मानवी रुपातील नाग दाखवून त्याच्या पाठीमागे सर्पाची वेटोळी किंवा उभा साप दाखवला जात असे. फर्ग्युसन आणि ओल्डहॅम या तज्ञांच्या मते हे नाग म्हणजे सर्पपूजक मानव असावेत. सर्प हे त्यांचे वंशचिन्ह. पुढे हेच मानव नाग किंवा सापाशी तादात्म्य पावले. नागाशी संबंध असलेल्या देवांना मानव रूपांसह नागरूपांत दाखविण्याची पद्धत इसवीसनाच्या आधीपासूनच होती. सांची, अमरावती याठिकाणच्या बऱ्याचशा मूर्त्यांमध्ये नाग किंवा सर्पफणा असलेल्या स्त्रीया आढळतात. या सापाचा फणा छत्रासारखा डोक्यावर उभारलेला असायचा. यातील डोक्यावरील सर्प फणांची संख्या त्या पुरूषांच्या किंवा स्त्रीयांच्या सामाजिक हुद्द्यावर अवलंबून होती. या रचनांमध्ये कालांतराने बदल होऊन मानव प्रतिमांच्या मागे सर्पफणा दाखवण्याऐवजी मानवाचे मुखच सर्पाफण्याचे दाखवण्याची पद्धत सुरू झाली. या नागांच्या शरीरावर खवले दाखवणे, मस्तकावर स्वस्तिक किॆवा इतर शुभचिन्हे दाखवणे इत्यादी प्रकारही होते. या नागांच्या सळसळत्या जिभाही काही प्रतिमांमध्ये अंकीत केल्या गेल्या आहेत. कुषाणकाळानंतर मात्र नागप्रतिमांमध्ये जुनी वैशिष्ट्ये नाहीशी झाली. पुढच्या काळात वेटोळे घातलेला नैसर्गिक साप सर्वत्र दिसू लागला. याचबरोबर एकाच दगडावर कोरलेले नाग-नागीण शिल्पही तयार होऊ लागले. अंबरनाथ येथील सुप्रसिद्ध शिवमंदिराच्या बाहेरच्या बाजूला नदीकाठावर असे शिल्प आहे. या प्रकाराला दक्षिणेत ‘नाग-कल’ म्हणतात. या प्रतिमांमध्ये सध्या आढळणारा सर्वसामान्य प्रकार म्हणजे उभा साप. आवासच्या नागोबा मंदिरातील प्रतिमा याच स्वरूपाच्या आहेत. रायगड किल्ल्यावरील बाजारपेठ मानल्या जाणाऱ्या वास्तूवरही असाच एक उभा साप कोरला आहे. नागांचा पाण्याशी जवळचा संबंध असतो. त्यामुळे बऱ्याचशा नाग मूर्त्या पुष्करणींच्या किंवा तलावांच्या काठावर आढळतात.
नाग हे पूजनीय असले तरी काही पौराणिक कथांमध्ये नागांशी संघर्ष सुद्धा झाल्याचे दिसते. श्रीकृष्णाने केलेले कालियामर्दन हे याच संघर्षाचे उदाहरण. भगवान विष्णूचे वाहन गरूड व नागांचे वैर, तक्षकाचा परीक्षिताशी संबंध, जन्मेजयाचा नागयज्ञ व त्यात नागांचा संहार अशी संघर्षांची अनेक उदाहरणे आढळतात. केवळ हिंदू कथांमध्येच नव्हे तर बौद्ध व जैन कथांतही असे प्रसंग आहेत. असे असूनही शिव, गणेश यांसारख्या देवतांसह त्यांनी धारण केलेल्या नागांना देखील सन्मान मिळाला आहे
सुदैवाने नागांचे पूजन अजूनतरी प्रतिमा रूपातच मर्यादित आहे. नागपूजनाच्या पद्धतीविषयक संत कबीर म्हणतात,
“नाग पंचमी आवे जदे, कोले नाग माँडती,
दूध दही से पूजती।
साँची को नाग सामें मिल जावे तो,
पूजा फेंकी ने भाग जाती रे।।”
थोडक्यात माणसे पूजेसाठी नागाची मूर्ती मांडतात खरे , पण खरा नाग आल्यावर मात्र पळत सुटतात. त्यामुळे केवळ प्रतिमाच नव्हे तर जीवसृष्टीत महत्त्वपूर्ण भूमिका बजावणाऱ्या सापांचेही रक्षण व्हावे ही अपेक्षा.
चला जाऊ वारुळाला, नागोबाला पुजायला : आनंद साऊरकर
पुराणात नऊ नागकुळ प्रसिद्ध आहेत :
अनन्तं वासुकिं शेषं पद्मनाभं च कम्बलं
शन्खपालं ध्रूतराष्ट्रं च तक्षकं कालियं तथा
एतानि नव नामानि नागानाम च महात्मनं
सायमकाले पठेन्नीत्यं प्रातक्काले विशेषतः
तस्य विषभयं नास्ति सर्वत्र विजयी भवेत
ll इति श्री नवनागस्त्रोत्रं सम्पूर्णं ll
(भिंतीवरील नाग प्रतिमा, फुलोरा आणि सर्वसाधारण नागकुळाचे रेखाटन)(avs)
नैवेद्य: पाच प्रकारचे धान्य जसे गहू, ज्वारी, तांदूळ, हरबरा आणि तीळ हे भाजून घेऊन याच्या लाह्या तयार करतात. ह्या लाह्यांचा व फुटाणे याचा नैवेद्यात आवर्जून वापर करतात. नऊ पुरिका (रव्याच्या पापड्या), नऊ करंज्या, वेणी-फुगी यांचा फुलोरा नागकुळावर टांगतात. काहीठिकाणी वाफवलेले, तर कुठे तळलेले पदार्थ स्वयंपाकाला बनवतात. स्वयंपाकात मेथीची भाजी आणि रव्याचा शिरा मुख्य असतो. तव्याचा वापर सुद्धा बरेच ठिकाणी करत नाहीत. नागकुळाला रव्याचे दोन लाडू बनवून त्याचा नैवैद्य घरी दाखवून ते वारुळावर अर्पण करतात. शेवटी नागाला विडा- सुपारी अर्पण करतात. कुठे नारळ अर्पण करून तो वारुळावर नेऊन वाढवतात. घरची पूजा आटोपल्यावर वारुळावर किंवा नागाच्या ठाण्यावर जाऊन पूजा करतात. आणि रव्याचे लाडू अर्पण करतात. घरी आल्यावर नागाला अर्पण केलेले दूध, ज्यांनी नाग काढले ते मिश्रण, भाजलेले पंच धान्य आणि फुटाणे एकत्र करून ते घरातील कानाकोपऱ्यात, अंगणात टाकतात. ज्ञात-अज्ञात सर्व सरपटणाऱ्या प्राण्यांना हा नैवेद्य.
भिक्षाटनमूर्ती :-
पुराणातील एका कथेनुसार शिव-पार्वती सारीपाटाचा खेळ खेळत असताना पार्वतीने शिवाचे त्रिभुवनासहीत सर्व वस्त्रेही जिंकून त्याला दिगंबर केले. त्यामुळे शिवाला भिक्षा मागत फिरावे लागले. भिक्षापात्र घेऊन उभा असलेल्या शिवाचे शिल्प अनेक मंदिरांमध्ये आढळते. या मूर्तीला भिक्षाटन शिव असे म्हणतात. वेरुळ येथील कैलासमंदिराच्या मागील (पूर्वेकडील) विथिकेत (व्हरांड्यात) हे शिल्प आढळते. येथे शिवाला भिक्षा वाढणारी स्त्री ही अन्नपूर्णा पार्वतीमाताच असते.
शिवाच्या भिक्षाटनांची कथा पद्मपुराणांत येते. एकदां सहस्र वर्षे चालणाऱ्या ब्रह्मदेवाच्या यज्ञांत 'पञ्चमुंड' व 'बृहत्कपाल' धारण करणारा शंकर भिक्षेसाठी गेला व त्याने अन्नाची याचना केली ब्रह्मदेवाने 'हो' म्हटल्यावर तो आपले कपाळ तेथेच ठेऊन आंघोळीकरिता म्हणून पुष्कर तीर्थावर गेला. इकडे त्या अपवित्र वस्तूला म्हणजे कपाळाला तेथून फेकून देण्यांचा ब्रह्मदेवांने प्रयत्न केला, पण तेथें एकाच्या जार्गी दुसरे कपाळ प्रगट होऊ लागले व सरतेशेवटी ब्रह्मदेवानें शिवाला पुरोडाशांतील भाग देणें स्वीकार केले.
भिक्षाटन प्रतिमेचे आगमांत बरेच वर्णन मिळते. उत्तर व दक्षिण दोन्हीकडे या प्रतिमा घडविल्या जात. खालील बाबतीत त्यांचे उभयसाम्य दिसते :
क) डोक्यावर जटामंडल :
ख) अंगावर दागिने
ग) बेंबीपर्यंत उचलेल्या डाव्या हातांत कपाळ किंवा भिक्षापात्र
घ) मस्तकावर असलेली तीन नरमुंडे.
या प्रकाराची एक सुंदर प्रतिमा लखनऊ संग्रहालयात आहे. तेथें वरील सर्व वैशिष्ट्ये तर दिसतातच पण त्याशिवाय विशेष लक्ष पुरविण्यांसारखें म्हणजे आयुधपुरुषाच्या रूपात त्रिशूल दिसतो. (चित्र ५५)
विष्णूच्या मानानें शंकराचा आयुधपुरुष कमी दिसतो. महाभारतांत शंकराच्या विजय नांवाच्या त्रिशूलाचें मानवरूपांत वर्णन प्राप्त होते. त्रिशूलाव्यतिरिक्त शंकराची परशू, पिनाक पाशुपत अस्त्र किंवा बाण याचेही मनुष्यरूपांत वर्णन मिळते.
कांचीपुरमच्या कैलासनाथार मंदिरात फिरताना शिवाचे एक वेगळेच रूप आपल्याला पाहायला मिळालं आणि याचे वेगळेपण शोधताना एक आगळीवेगळी कथा समोर आली ती म्हणजे “भिक्षाटन” करणाऱ्या शिवाची. ही मूर्ती जवळपास नग्न, म्हणजे सर्वस्वाचा त्याग केलेली आहे आणि भैरवासारखी उग्र देखील नाही. याची कथा थोडक्यात समजली ती अशी…

लिंगोद्भव शिवाच्या स्वरूपाने कालभैरवाला जन्म देत ब्रम्हाचे ५ वे शीर कापले. या ब्रह्महत्येच्या पापामुळे ते शीर त्याचा हाताला चिकटले. म्हणून पापाचे परीक्षालन करण्या करिता शिवाने भैरवाचे रुप टाकून कापालिकाचे (ब्रम्हाच्या कपालातून भिक्षा मागणारा) रुप धारण केले. हाच कापालिक म्हणजे देशोदेशी भिक्षाटन करत फिरणारा शिव.

आता या फोटोमध्ये असलेल्या शिवाचे निरीक्षण करूयात. आधी सांगितल्याप्रमाणे डावीकडून उजवीकडे असे निरीक्षण करायचे आहे. मूर्ती स्थानक म्हणजेच उभी आहे, हातामध्ये पकडलेला त्रिशूळ आणि त्या दंडाला खाली वेटोळे दिलेला नाग, कमरेवर नेसलेले वाघाचे कातडे (गुडघ्याजवळ वाघाचे तोंड दिसेल), डोक्यावर असलेला जटा मुकुट, पाठीमागे कोरलेली प्रभावळ किंवा वलय हे त्याच्या दैवत्वाचा पुरावा देतात..
लिंगपुराण, शिवपुराण, इत्यादी पुराणांमध्ये शंकराच्या कथा आपल्याला वाचायला मिळतात. वेदांमध्ये छोट्या प्रमाणात दिसणारा रुद्र ते पौराणिक कालखंडात प्रमुख देव म्हणून दिसणारा शिव हा प्रवास खरंच अद्भुत आहे.
दक्षिणेकडील काही देवळात शिवाचे हे “भिक्षाटन” रुप आढळते. राजाराजा चोलाचा पुत्र राजेंद्र चोला याने बांधलेल्या गंगाईकोंडा चोलापूरम येथील मंदिरात देखील हे आहे. भिक्षाटन करणारा हा शिव तिन्ही लोकात भटकतो तसा तो देवदार वनात (अथवा दारुक वनात) देखील जातो. तेथे ऋषीमुनी यज्ञ कार्यात गुंतलेले असतात. ऋषीपत्नी या शिवाचे नग्न पण तेजस्वी रुप पाहून मोहित होतात व त्यांची वस्त्रे ढळतात, अशीही शिल्पे काही ठिकाणी आहेत. कधीकधी या शिवाबरोबर इतर स्त्रिया, किंवा भिक्षा टोपलीत घेऊन चालणारा सहायक असेही दाखविले जातात. काही ठिकाणी ऋषीमुनी त्याला मारायला धावतात (आपल्या स्त्रियांना नादाला लावल्यामुळे) अशीही शिल्पे आहेत. यात शिल्पांमध्ये बरेचदा शिवाच्या पायात खडावा देखील दाखविल्या जातात. बरेचदा भिक्षा देणारी स्त्री “देवी अन्नपूर्णा” म्हणून देखील दर्शविली जाते.
भिक्षाटन शिवाच्या पुराणातील कथा
पुराणातील कथांनुसार यात वैविध्य आढळते. कूर्म पुराणानुसार या भटकंतीत शिव पुढे वैकुंठाला जातो तेव्हा त्याचे हे कापालिक रूप बघून विष्णूंचा द्वारपाल “विश्वकसेन” त्याला अडवितो तेव्हा संतप्त झालेला भिक्षाटन शिव विश्वकसेनाला आपल्या त्रिशुळाने मारून उचलतो व अजून एक पाप जोडतो. आता हे भिक्षाटन रुप कंकालमूर्तीत परिवर्तित होते व विष्णूकडे आपल्या मुक्ततेसाठी भिक्षा मागते. यावेळी विष्णू त्याच्या मस्तकाची शीर कापून त्याचीच धार अन्नरूपात या कंकालाच्या भिक्षापात्रात टाकतो व त्याला वाराणसीत जाऊन पापक्षालनाचा सल्ला देतो. तसे केल्यावर भिक्षाटन शिवाच्या हस्ताला चिकटलेले ब्रम्हाचे शीर गळून पडते. ही जागा म्हणजेच वाराणसीतील “कपाल मोचन कुंड” याच ठिकाणी विश्वकसेनाचे शव देखील अदृश्य होते व शिवाचे पापक्षालन होऊन तो पुन्हा कैलासावर परततो.

वामन पुराणात हि कथा थोड्या वेगळ्या स्वरूपात येते. या कथेनुसार प्रजापती दक्षाच्या यज्ञात सती पार्वतीने स्वतःला झोकून दिल्यावर तिच्या विरहाने व्याकुळ झालेला व त्याचबरोबर मदनाने त्याला उन्माद आणि विजृम्भण नावाचे दोन बाण मारून विद्ध केले. हा शिव संतापात विश्वात भ्रमण करून जगताला पीडा देत असताना यक्षाधिपती कुबेराचा पुत्र “पांचालिकाने” त्याला पाहिले व शिवाकडून ही दोन्ही अस्त्रे धारण करत तो “पांचालिकेश” झाला आणि शिव पुढे विंध्य पर्वताकडे भिक्षाटनासाठी निघाला तोच शिव म्हणजे हा “भिक्षाटन शिव”. पण शंकराला त्या अवस्थेत पाहून वसिष्ठ पत्नी अरुंधती आणि अत्री पत्नी अनुसूया यांच्या व्यतिरिक्त इतर ऋषीपत्नी मोहित होऊ लागल्या, त्यांची वस्त्रे ढळू लागली आणि म्हणून संतप्त झालेल्या ऋषींनी शिवलिंग पृथ्वीवर पतित होईल असा शाप दिला आणि शंकराची कामभावना गळून पडली, आणि शंकर तेथून अंतर्धान पावले.

याप्रकारे शांत झालेले शंकर वनांत शांत बसलेले असताना कामदेव मदन त्यांच्या मागावर आला. त्याला पाहून शंकर क्रोधीत झाले व त्यांनी आपला तृतीय नेत्र उघडून त्याला भस्म केले, म्हणजेच त्यांनी कामभावनेवर संपूर्ण विजय प्राप्त केला. भस्म झालेला कामदेव मदन त्यानंतर विना अंगाचा म्हणजेच अनंग म्हणून फिरू लागला.

स्कंद पुराणानुसार ही कथा अगदी वेगळ्या स्वरुपात येते. यानुसार दारुक (देवदार) वनातील ऋषींचे गर्वहरण करण्याकरिता शिवाने “भिक्षाटन” रूप धारण केले तर विष्णूने मोहिनीरूप. तेथे तपश्चर्या करणाऱ्या ऋषींचे गर्वहरण करण्याकरिता शिव तेथे भिक्षेला गेले तेव्हा ते सतीच्या विरहाने व्याकुळ व तिच्याच विचारात होते. म्हणून ऋषिपत्नींना त्यांची दया आली व त्या त्यांना भिक्षा देऊ लागल्या. ते सहन न झाल्याने ऋषींनी त्यांना तुम्ही षंढ व्हाल असा शाप दिला पण यानंतर त्या ऋषींना सर्व जागाच लिंगमय भासले व त्याचा आदी आणि अंत त्यांना सापडेना. यावर त्यांनी हि गोष्ट ब्रह्मदेवानं सांगितली तेव्हा ब्रह्मदेवांनी शंकरांना हंसरूप घेऊन त्या लिंगाचे मूळ सापडल्याची कथा सांगितली आणि केतकीच्या फुलाची साक्ष दिली. यानंतर लिंगपूजा सर्वव्यापी झाली व अनेक ठिकाणी शिवलिंगाची स्थापना केली गेली.
भिक्षाटन शिव शिल्प ओळखायचे कसे?

या शिवाच्या रूपाचे वैशिष्ट्य म्हणजे शिवाचे नग्न स्वरूप. यातील शिल्पात बरेचदा शिवचरणी लीन झालेल्या स्त्रिया असतात. कामासक्तीने वस्त्रे ढळलेल्या स्त्रीचे शिल्पदेखील कधी कधी सोबत दाखविलेले असते. तर कधी जमलेली भिक्षा एका टोपलीत सोबत घेऊन चाललेला गण असतो व शिव त्यातीलच काही भाग सोबत असणाऱ्या कुत्र्याला देत असतात. भैरव स्वरूपात हातात ब्रम्हाचे ५ वे शीर हातात घेऊन चाललेला शिव असतो. खांद्यावर अथवा हातात त्रिशूल असतो आणि बरेचदा या शिल्पांच्या पायात खडावा असतात ज्या इतर शिव शिल्पांमध्ये आढळून येत नाहीत.

भिक्षाटन शिवाच्या अनेक मूर्ती तामिळनाडूच्या विविध देवळातून पाहायला मिळाल्या. बृहदीश्वर मंदिर (तंजावर), एकांबरेश्वर मंदिर (कांचीपुरम), जळकंठेश्वर मंदिर (वेल्लोर) अशा काही मूर्तींची छायाचित्रे मी येथे टाकली आहेत पण सर्वसाधारणपणे दक्षिणेकडील बऱ्याच मंदिरात एकाहून अनेक खांबांवर शिवाचे भिक्षाटन, भैरव, कापालिक अशी अनेक रूपे सापडतात. फक्त आपण नीट निरीक्षण केले पाहिजे आणि या पाठीमागची कथा आपल्याला समजली तर ती शिल्प कळल्याचा आनंद देखील होतो.
महाराष्ट्रातील खिद्रापूरच्या कोप्पेश्वर (Koppeshwar Temple, Khidrapur, Maharashtra) मंदिरात, अंबरनाथच्या आम्रेश्वर शिव मंदिरात (Ambreshwar Temple, Ambarnath, Maharashtra) देखील हि शिल्पे कोरली असल्याचे आढळले.
लिंगोद्भव मूर्ती :-
शिव मूर्तीच्या शिल्पांकनांचे तीन गट पडतात. व्यक्त, अव्यक्त आणि व्यक्ताव्यक्त. ज्या मूर्ती शारीर रूपात शिव दिसतो त्याला व्यक्त म्हणतात. अव्यक्त रूप म्हणजे शिवलिंग आणि त्याचे प्रकार. लिंगोद्भव शिवाची. ही मूर्ती लिंग आणि मूर्ती अशा दोन्ही प्रकारांत गणली जाते.
त्रिशुंड गणपती मंदीर, पुणे येथील लिंगोद्भव शिवमुर्ती
वेरूळ कैलास लेण्यातील लिंगद्भव शिवप्रतिमा


लिंगोद्भव मूर्ति, चोल राजवंश,१२ वे शतक (सध्या राष्ट्रीय संग्रहालय, दिल्ली )

ऐरावतेश्वर मंदिरातील मागील भिंतीवरील लिंगोद्भव शिव मूर्ती. डावीकडे ब्रम्हा तर उजवीकडे विष्णू. तसेच वरच्या बाजूला हंसरूपात ब्रह्मा तर खालच्या बाजूला वराहरूपातील विष्णू


लिंगपुराण, कूर्म पुराण, वायु पुराण आणि शिवपुराण यामध्ये हि लिंगोद्भव शिवाची कथा आहे. त्यामध्ये शिवांना ब्रम्हदेव आणि विष्णुची मुळ देवता मानलेले आहे. दक्षिण भारतात लिंगोद्भव शिल्पपट मोठ्या प्रमाणात दाखवलेला असतो. बहुतेकदा हा शिल्पपट मंदीराच्या गर्भगृहाच्या पश्चिमी भिंतीवर दाखवलेले असते. हे शिल्प पश्चिमी भिंत किंवा मंडोवरावर असण्याचे कारण म्हणजे लिंगोद्भव शिवाची उर्जा मंदीराच्या पुर्वेच्या दरवाज्यातून बाहेर पसरते. आणि हि उर्जा शिवभक्तांना आशिर्वाद स्वरुपात मिळते. प्राचीन शिल्पशास्त्रानुसार लिंगोद्भव मूर्तिमध्ये शिवलिंगाचा पाचवा भाग वर आणि पाचवा भाग खाली दाखवलेला असतो. मध्ये भगवान शंकरांचे चंद्रशेखर स्वरुपात दाखवलेले असते. जर भगवान शंकरांना चार हात असलेल्या रुपात दाखवायचे असल्यास एक हात अभय मुद्रेत, दुसरा वरद मुद्रेत, तिसरा हातात परशु किंवा शुळ धारण केलेला असतो तर चौथा हातात काळ्या रंगाचे हरण दाखवलेले असते. भगवान शिवांच्या चेहर्यावर शांतता दाखवलेली असते. त्यांचे केस जटेच्या मुकुट स्वरुपात दाखवलेला असतो, तर डोक्यावर अधचंद्र धारण केलेला असतो. त्यांनी दागिने म्हणून नागांना धारण केलेले असते.
दारासुरम, तमिलनाडु मधील लिंगोद्भव शिल्पपट
कर्नाटकमधील पट्टदकल मधील लिंगोद्भव शिल्पपट
तमिलनाडु दारासुरम मधील लिंगोद्भव मूर्ति जवळून
लिंगोद्भव मूर्ति, कांची कैलाशनाथर मंदिर, कांचीपुरम, तमिलनाडु
क्रोधित शिव ब्रम्हदेवाचे पाचवे शीर कापताना, कांची कैलासनाथर मंदिर, कांचीपुरम, तमिलनाडु
गुजरातमधील दहाव्या शतकातील लिंगोद्भव मूर्ति, राष्ट्रीय संग्रहालय दिल्ली
Simhanatha Temple, Badamba, Cuttack.
लिंगोदभव शिवाची ही सर्व घटना तामिळनाडूतील अरुणाचलेश्वर मंदिर परिसरात घडली असे मानले जाते. म्हणूनच हे मंदिर पंचमहाभूतांपैकी अग्नी तत्वाचे निदर्शक मानले. जाते. या घटनेचे वर्णन आपल्याला अरुणाचल पुराण या स्थलमाहात्म्य पुराणात आढळून येते.
या शिल्पामध्ये आपल्याला बरेचदा डावीकडे ब्रह्मदेव तर उजवीकडे श्रीविष्णू पाहायला मिळतात व लिंगातून प्रकटलेल्या शिवपिंडीवर आपल्याला हंसरुपातील ब्रह्मदेव आणि खालच्या बाजूला वराहरुपातील श्रीविष्णू दिसून येतात.
लिंगिन शिवमूर्ती
वेरूळच्या कैलास लेणीच्या मुख्य प्रवेशद्वारावरील गोपुरावर असणारा हा लिंगिन शिव
वेरूळ कैलास लेणीच्याच प्रदक्षिणापथावर असलेला हा लिंगिन शिव
प्रदक्षिणापथावरच असलेली लिंगिन शिवाची अजून एक प्रतिमा. ह्याने आपल्या उजव्या हातातील बोटांमध्ये शिवलिंग धारण केले आहे.
शंकराचे नर्तन देखील फारच प्रसिद्ध आहे. शिव तांडवाचे अंकन दक्षिणेंत लोकप्रिय होतें. उत्तर भारतांत शिवाच्या नृत्य-मूर्ती कमी मिळतात, पण त्याची सुरुवात मात्र गुप्तकाळांपासून झालेली आहे. नचना कुठरा येथून नृत्य करणाऱ्या चतुर्भुज शंकराची एक खंडित प्रतिमा आपणांस मिळाली आहे.
उमरगानटराज शिव अथवा नृत्य मूर्ती
हा एक सर्वपरिचीत प्रकार. नटराज प्रकारात शिव हा नृत्यमुद्रेत दिसतो. शिवाने १०८ प्रकारे नृत्य केले अशी मान्यता आहे. तांडवनृत्यसुद्धा ह्या नटराज प्रकारातच येते.
नटराज शक्यतो चारापेक्षा अधिक हातांचा दर्शवला जातो. ८, १०, १६ हातांचेही नटराज आहेत. हातांमध्ये त्याने खङग, शक्ती, दंड, त्रिशुल, नाग, ज्वाला इत्यादी आयुधे धारण केलेली असतात.
वेरूळ लेणी क्र. २१ रामेश्वर येथील कटीसमनृत्यमुद्रेत असलेली शिवप्रतिमा
वेरूळ लेणी क्र. १६ येथील शिवतांडव प्रतिमा
दशावतार लेणीतील नटराज -

अपस्मार पुरुषावर नर्तन करणारा नटराज

कैलासनाथ मंदिर, कांचीपुरम इथली ही नटराजाची प्रतिमा आहे. यामध्ये आक्राळ अश्या अपस्मार पुरुषावर शिव नृत्य करतो आहे. त्याचा उजवा पाय हा अपस्माराला दाबतो आहे तर दुसरा ऊर्ध्वजानु करणामध्ये वर उचललेला आहे. या शिल्पामध्ये शिवाची चर्या काहीशी भयानक झाली असली तरी चेहऱ्यावर स्मित आहे. या शिल्पामध्ये नटराज चतुर्भुज आहे. त्याच्या हातामध्ये त्रिशूल, पाश, अलपल्लव मुद्रा आणि सूची मुद्रा आहे. त्याच्या डाव्या पायाशी फणा काढलेला भुजंग आहे. नटराजाच्या डोक्यावर जटामुकुट आहे. कानात गोल कुंडले आहेत. खांद्यावर कोरीव यज्ञोपवीत आहे. दंडात त्रिवलय केयूर आणि हातांमध्ये कंकण आहे. कटीला वस्त्र आणि त्यावर मेखला आहे. पायामध्ये नुपर दाखवले आहेत. त्रिनेत्र नटराजाचे डोळे गोल व मोठे आणि दात बाहेर आलेले दाखवून यातील उग्र भाव सहज प्रदर्शित होत आहे. या नटराजाने त्याचा उजवा पाय या जाडजूड, बेढब मूलयकावर ठेवला आहे. शिवाची सूची मुद्रा ही अपस्मार पुरुषासाठी चेतावनी देणारी आहे. या अपस्मार पुरुषाच्या चेहऱ्यावर त्याची हतबलता स्पष्ट दिसत आहे. शांत चित्ताने या शिल्पाकडे पहिले तर, शिवाच्या नृत्यावस्थेतील संवेग, शिल्पातून अभिव्यक्त होणारे भाव एखाद्या कथेप्रमाणे आपल्या मनात झिरपत जातात.
औंढ्या नागनाथ मंदिरातील नटराज
महाराष्ट्रातील एक महत्त्वपूर्ण शैव क्षेत्र असलेल्या औंढ्या नागनाथ मंदिराच्या जंघाभागावरील एक नटराज प्रतिमा आज बघणार आहोत. औंढ्या नागनाथ मंदिर द्विजंघायुक्त असल्याने शिल्पवैभवाने संपन्न असे हे मंदिर आहे. या मंदिराचा अभ्यास करीत असताना याच्या जंघा भागावर एकूण चार नटराज प्रतिमा नोंदवता आल्या आहेत. त्यापैकी एक अत्यंत सुंदर अशी प्रतिमा आज बघणार आहोत.

कैलास मंदिराच्या मार्गिकेवरील नटराज :-


ही नटराज प्रतिमा कैलास मंदिराच्या मार्गिकेवर आहे. हातामध्ये सर्प धरलेल्या अपस्मार पुरुषाच्या अंगावर दोन्ही पाय ठेऊन मण्डल स्थानात नृत्यरत शिवाचे हे शिल्प आहे. अष्टभुज नटेशाच्या हातामध्ये करीहस्त मुद्रा, कट्यावलंबित हस्त, डमरू, सर्प आणि कटकमुद्रा आहे. डोक्यावर मुकुट आहे. त्रिनेत्र शिवाची चर्या रौद्र भाव दर्शवणारी असली तरी चेहऱ्यावर स्मित आहे. गळ्यात ग्रेवैयक आहे, डाव्या खांद्यावर रुळणारे यज्ञोपवीत आहे. पोटाला उदरबंध आहे. दंडामध्ये केयूर तर हातांमध्ये केयूर आहे. कटीला वस्त्र आहे. नटराजाच्या पायाखाली दाबल्या गेलेला कुरूप, बेढब शरीरयष्टी असलेला मूलयकही लक्षवेधी आहे.

वेरूळ मध्ये अनेक नटराज प्रतिमा आहेत. कैलास मंदिराच्या मार्गीकेवरील हे दुसरे नटराज शिल्प काहीसे भिन्न आहे. कैलास मंदिराच्या मार्गिकेवर कोरीव देवकोष्टामध्ये असलेल्या दक्षिणाभिमुख अश्या नटराजाचे दर्शन होते. अपस्मार पुरुषाच्या अंगावर डावा पाय रोवून आवेशपूर्ण नर्तन करणाऱ्या चतुर्भुज नटेश या शिल्पामधून दिसतो. या चार भूजांपैकी काही भग्न झालेल्या आहेत. मात्र उजव्या मागच्या हातामध्ये डमरू आहे तर मागचा डावा हात शिवाने कमरेवर ठेवला आहे. भुजंगत्रसित पदन्यासात शिवाने त्याचा उजवा पाय उचललेला असून डावा पाय अपस्मार पुरुषावर रोवलेला आहे. या शिल्पामध्ये आ-वासलेला भुजंग शिवाच्या उजव्या बाजूला दाखवलेला आहे. शिवाच्या डोक्यावरील जटा या रत्नपट्टाने बांधलेल्या आहेत. त्रिनेत्र शिवाची चर्या रुद्र भाव दर्शवणारी आहे. गळ्यात ग्रेवैयक आहे, डाव्या खांद्यावर रुळणारे यज्ञोपवीत आहे. नटराजाच्या पायाखाली दाबल्या गेलेला जाड-जुड शरीरयष्टी असलेला मूलयकही लक्षवेधी आहे. त्याच्या गळ्यात एक माळा आहे. त्याच्या केसांच्या कुरळ्या बटाही शिल्पकाराने बारकाईने कोरल्या आहेत. त्यामुळेच हे शिल्प लक्षवेधी झाले आहे.
ऊर्ध्वरेता नटराज -

भुजंगत्रसितम् -

शुकनासिकेतील नटराज -
मंदिर स्थापत्यातील एक महत्त्वाचा आणि लक्षवेधी घटक म्हणजे शुकनास. मंदिराच्या छाद्य भागावर शिखर सुरु होते. या शिखरावर शुकनासिका किंवा महाशुकनासिकेची रचना केलेली असते. ‘शुक’ म्हणजे पोपट आणि ‘नासिका’ म्हणजे नाक त्यामुळे या स्थापत्य घटकाचा आकार हा पोपटाच्या नाकाप्रमाणे असल्याने याला शुकनास असे म्हणतात. या शुकनासिकांमध्ये विविध देवी- देवता किंवा क्वचित सिद्धांची शिल्पे असतात. त्यापैकी नटराज शिल्पांचा विचार आज करणार आहोत.

अनेक मंदिरांच्या शिखरांवर शुकनासिका या नृत्यमग्न शिवाच्या नटराज विग्रहाने सुशोभित केलेल्या असतात. भारतभर अनेक मंदिरांवर अश्या शुकनासिकेतील नटराज शिल्पे बघायला मिळतात. नागर शैलीतील इ.स. 8 व्या शतकातील जम्बूलिंगेश्वर मंदिर, पट्टदकल (प्रतिमा क्र.1) या मंदिराच्या शिखराच्या शुकनासिकेवर नटराज शिवाचे शिल्प आहे. मध्यभागी अष्टभुज नटराज कटीसम ताण्डव करीत आहे. शिवाच्या मागे वृषभ असून त्याच्या डावीकडे द्विभुजा उमा त्रिभंग स्थितीत उभी आहे. शिवाचा उजवा हात नाभीजवळ आणि दुसरा सिंहकर्ण मुद्रेत तर डावा हात करीहस्त आणि एक हात मांडीवर ठेवला आहे. इतर हातांमध्ये डमरू, परशु, सर्प असून एक हात उमेच्या खांद्यावर आहे ही सालंकृत प्रतिमा आहे. या शुकनासिकेच्या दोन बाजूला दोन नाग हात जोडून शिवाचे हे नृत्य बघत आहेत. तसेच आकाशगामी गंधर्व हे या दिव्य नृत्याचे आकाशातून अवलोकन करीत आहेत.

शिवाच्या तांडवमूर्ती :-
सर्व साधारणपणे कलाकारांचा देव म्हणून परिचित असलेले नटराजाचे धातूचे शिल्प सर्वांना परिचित रूप आहे. शिवाच्या तंडू नावाच्या भक्तापासून या नृत्याची निर्मिती झाली, म्हणून याला 'तांडव' असे म्हणतात. तांडवाचे एकूण १०८ प्रकार असतात. चिदम्बरम (तामिळनाडू) येथील तिल्लई नटराज मंदिराच्या गोपुराच्या (प्रवेशद्वाराच्या) भिंतीवर हे सर्व १०८ प्रकार कोरलेले आहेत. तसेच तामिळनाडूमधल्या कुंभकोणम् येथील शारङ्गपाणी मंदिर, वृद्धाचलम येथील वृद्धगिरीश्वरार मंदिर आणि तिरुवनमलई येथील अन्नमलैयर मंदिराच्या गोपुरावरही हे १०८ प्रकार कोरलेले आढळतात.
कटीसम तांडव :-
वेरुळमधील रामेश्वर लेण्यात (क्र.२१) याचे अत्यंत श्रेष्ठ असे शिल्पांकन दिसते. यात शंकराचे डावे पाऊल पूर्ण उचललेले असून केवळ त्याची बोटे खाली टेकलेली आहेत आणि उजवे पाऊल अर्धवट उचललेल्या अवस्थेत आहे. त्याच्या वरच्या उजव्या हातात डमरू आणि वरच्या डाव्या हातात अग्नी असून खालचा उजवा हात अभय मुद्रेत असून खालचा डावा हात नृत्य मुद्रेत आहे. कानात कुंडले, गळ्यात कंठी आणि हार, पोटाभोवती उरबंध, हातात कंकणे, दंडावर सर्पकेयूरे व कंबरेत मेखला आहे. त्याने वाघाच्या कातड्याचे वस्त्र नेसले असून त्या वस्त्राच्या टोकाला बारीक वाघनखेही दिसतात. त्या शिल्पाच्या मागील भिंतींवर शिवाच्या डाव्या हाताच्या बाजूला वायू, कुबेर, इंद्र आणि यम हे अष्ट दिक्पालांपैकी चार दिक्पाल आपापल्या वाहनांसहित आहेत आणि शिवाच्या उजव्या हातावर काही आकाशमार्गाने उडणारे तपस्वी आणि गंधर्व आहेत.
शिवाच्या उजव्या पायाशेजारी तीन वादक असून त्यांच्यावरच्या अंगाला एका हत्तीचे डोके दिसते. तो गणपती आहे. शिवाच्या डावीकडे एक मिशा असलेला पुरुष उभा असून त्याच्या समोर कडेवर बाळ कार्तिकेयाला घेउन एक स्त्री उभी आहे. त्या दासीच्यासमोर शिवाकडे तोंड करून पार्वती बसली आहे आणि पार्वतीकडे तोंड करून वादन करणारी एक स्त्री आहे. तिच्यामागे उभ्या असलेल्या दासीचा चेहरा आणि गळा तेवढाच दिसतो. शिवाच्या पायामध्ये एक छोटा अस्थिपंजर गण (भृंगी) नाचताना दिसतो.या नृत्य प्रकाराला 'कटीसम तांडव' म्हणतात. नटराजाच्या या शिल्पाची गणना भारतातील श्रेष्ठ शिल्पात केली जाते. किंबहुना नटराजाच्या शिल्पामधील कटीसम मुदे नृत्याबरोबरच भावदर्शन घडविणारे हे सर्वात श्रेष्ठ शिल्प ठरेल. या शिल्पात तांडवाचे सर्व गुणधर्म दाखवत असताना
(उत्पत्ती, स्थिती, लय, तीरोभाव आणि अनुग्रह) त्याचबरोबर भारतीय नृत्याचाही फार बारकाव्याने विचार केलेला आहे. शिवाच्या उजव्या बाजूला असलेल्या चार वादकांपैकी दोघीजणी बासरी वाजवताहेत, नृत्याला संगीताची जोड आवश्यक असते. परंतु भारतीय संगीताला तालाची आवश्यकता असते. म्हणून तिथे खोळ
(मृदंगासारखे वाद्य) बाजवताना आणि त्याचबरोबर त्यांच्यासमोर चुंबळावर उभे तबल्यासारखे वाद्य अशी ताल वाद्ये वाजवणारा बसलेला आहे.
तबलावादक महिला, भाजे लेणे
अमीर खुसरो (इ.स.१४वे शतक) याने तबल्याचा शोध लावला असा गैरसमज आहे. तो दूर करण्यास कारण इ.स. च्या सातव्या शतकात तबल्याचे स्पष्ट शिल्पांकन या शिल्पात दिसते. तबला हे वाद्य भारतीय संगीताइतकेच प्राचीन असावे. (भाजे येथील इ.स. पू. दुसऱ्या शतकातील लेण्यांमध्ये एक स्त्री उजव्या हाताने तबला आणि डाव्या
हाताने डग्गा वाजवताना कोरलेली आहे.) भारतीय संगीतातील तालाचे आणखी एक वैशिष्ट्य असे की त्याला ठराविक मात्रा असतात. यामध्ये पहिल्या मात्रेला 'सम' असे म्हणतात. आणि तालाच्या रचनेनुसार त्यातील एक मात्रा 'काल' अशी असते. परतपरत समेवर येण्याच्या कालांतराला 'लय' असे म्हणतात. या शिल्पांमध्ये तबलेवाल्याच्यासमोर त्यांच्याकडे तोंड करून बसलेली, हातात झांज घेतलेली एक स्त्री वादक आहे. प्रत्येक वेळेस तालवादक समेवर आल्यावर ती झांज वाजवते. हिच्या दोन झांजांच्या वाजण्यामधील कालावधीने तालाची आणि या नृत्याची लय प्रस्थापित होते नृत्याच्या बाबतीतील अगदी महत्त्वाची आणखी एक गोष्ट म्हणजे त्याला गती असावी लागते. स्थिर शिल्पामध्ये गतिमानता दाखविण्यासाठी कलाकाराने यात आणखी एक युक्ती केलेली आहे. शंकराच्या केशसंभाराचा जटांना आवळून त्याचा टोप केलेला दाखवला जातो. इतर देवांप्रमाणे याच्या डोक्यावर टोपी किंवा मुकुट नसतो. या केशरचनेला 'जटा मुकुट' असे म्हणतात. या शिल्पामध्ये कलाकाराने अशी कल्पना केली की हे नृत्य अनंत काळ चालत राहिले आणि एका क्षणी शंकराचा जटामुकुट हा सैल झाला आणि त्यातील वेण्या निखळल्या. निखळलेल्या एका वेणीची बट सुटून ती शंकराच्या खांद्यावर रूळताना दिसते. ज्यांना नृत्याची जाणीव आहे, अशा लोकांना हे शिल्प पाहताना अशी बट निखळण्यासाठी नृत्याची हालचाल कशी असू शकते हे ज्ञात असते त्यामुळे स्थिर शिल्पातही असणारी गतिमानता त्यांना कळू शकते. अपेक्षा अशी आहे की जर दगडातील ही गतिमानता दर्शकाला समजू शकली तर संभवतः सभोवतालच्या चराचर सृष्टीमधील चैतन्याचा साक्षात्कारही त्याला कधीतरी होऊ शकेल या शिल्पातील पार्वती ही शिवाचे नृत्य पाहते आहे. नवऱ्याचा पराक्रम कौतुकाने पाहणारी स्त्री ही देखील कलाकाराची प्रतिभा आहे की काय असे वाटावे. परंतु ज्ञानदेवांनी मात्र या प्रसंगावर कोटी केलेली आहे.
'वामांगीचा लास्यविलासु ! जो हा जगतूप आभासु !
तो तांडव मिसें कळासू ! दाविसी तू !' (ज्ञा. अध्याय १७ ओवी ८)
पार्वती जणू काही म्हणते की, , सृष्टीच्या निर्मितीची प्रसूती वेदना तर माझी, केवळ तांडवाच्या रूपाने हे (शिव) नृत्यातून दाखवतात आणि निर्मितीचे सारे उत्पत्ती आणि लयाचे हे अविरत चालणारे चक्र दाखविण्यासाठी त्याने तालवादकाचर्चा श्रेय बळकावतार। हे केलेली आहे. सम म्हणजे निर्मिती (जन्म) आणि काल म्हणजे लय (मृत्यू) प्रत्येक आवर्तनार जन्म आणि एकदा मृत्यू अशी कल्पना करून संगीतामध्येही आपल्या पुनर्जन्माच्या प्रतिनिधित्व केलेले आहे. काळाचे चक्र अविरत फिरत असून त्यात पुनःपुन्हा घटना घडतात असे असले तरी आपल्या जीवनात एकदाच जन्म आणि मृत्यू येत असतो आपल्या दृष्टीने काळ हा चक्र नसून एकमार्गी (unidirectional) असतो. कारण आपल्या दृष्टीने आपण काळात सतत पुढेच कसे असतो. हे दाखविण्यासाठी शंकराच्या डाव्या पायाखालील स्त्री वादकाच्या हातात तालाच्या प्रत्ये मात्रेवर वाजणारे एक वाद्य आहे. तिच्यासाठी सम आणि काल नाही तर तिचा ताल एकमार्गी शिवाचे वैश्विक नर्तन हे चक्राकार (cyclic) असून त्याची पार्थिव अनुभूती मात्र एकमार्गी (unidirectional) असते हे सांगण्यात कलाकार यशस्वी झाला आहे.
तांडवाच्या शिल्पांच्या कल्पकतेसमोर जगातील कलाकार आणि विद्वान विनम्र होतात. रोडी (Rodin) या जगप्रसिद्ध फ्रेंच शिल्पीने तर हे शिल्प पाहिल्यावर असे म्हटले आहे की, यातील परिपूर्णता पाहून मला छिन्नी आणि हातोडी फेकून शिल्पकलेतून निवृत्त व्हावेसे वाटते. उत्पत्ती, स्थिती आणि लयीचे हे महान नृत्य ज्या रंगमंचावर चालते त्याला चिदंबरम् असे नाव दिलेले आहे.आनंद कुमारस्वामी हे जन्माने श्रीलंकेतील असले तरी भारतीय शिल्पशास्त्राचे गाढे अभ्यासक होते. त्याने नटराजाचे हे नृत्य चालणाऱ्या रंगमंचाचे नाव चिदंबरम् का? यावर भाष्य केले आहे. ते असे म्हणतात की चिदंबरम् या शब्दावर श्लेष केलेला आहे. त्याचा दुसरा अर्थ मानवी अंतःकरणाचा केंद्रबिंदू असाही होतो. कुमारस्वामी पुढे म्हणतात, की या भारतीय कलाकारांची महती काय तर त्यांच्या
शब्दात "While the artists of the world were trying to understand and imitate nature ancient Hindu artists were trying to understand nature's nature."
नादंत तांडव :-
कलेच्या कार्यक्रमात रंगमंचावर हे शिल्प नेहमी दिसते किंवा नाटक सुरू होण्यापूर्वी पडद्यामागे त्याचे पूजन केले जाते. धातुमुर्तीमध्ये गोलाकार वलयामध्ये एका पायावर उभ्या असलेल्या शंकराची नृत्य मुद्रा यात दिसते. वलयावर प्रत्येकी पाच ज्वाला असलेल्या अग्नीचे शिल्यांकन असते.चार हातांच्या ह्या मूर्तीतील वरच्या उजव्या हातात डमरू आणि वरच्या डाव्या हातात अग्री असून, उजवा हात अभय मुद्रेत असून खालचा डावा हात गजहस्त (हत्तीच्या साडेसारखा झुलणारा) उजव्या मनगटाखाली डाव्या हाताचे मनगट असते, डाव्या हाताच्या बोटाने त्याने उचललेल्या पायाकडे अंगुलीनिर्देश केलेला असतो. तोल सावरण्यासाठी किंचित गुडघ्यात वाकविलेल्या उजव्या पायाखाली एक व्यक्ती दिसते. हात पाय दुमडून बसलेल्या या व्यक्तीच्या पाठीवर शिवाचा उजवा पाय असतो. तांडवाचे एकूण एकशे आठ प्रकार आहेत. त्यातील या मुद्रेला नादंत तांडव असे म्हणतात. शंकराभोवताली असणारे हे ज्वालांचे वलय यातील प्रत्येक ज्वालेला पाच शिखा असतात. पंचमहाभूतांचे ते निर्देशक आहे. यांची संख्या सत्तावीस असून हे सत्तावीस नक्षत्रांमध्ये बद्ध असलेल्या आपल्या आकाशगंगेचे रूप असते. डमरू हे उत्पत्तीचे रूप. ब्रह्मांडामध्ये सर्वप्रथम महानाद झाला आणि मानवी बोधाचे शब्द प्रकटले-
अइउण्। ऋलृक् । एओङ्। ऐऔच्। हयवरट्। लण्। अमड. णनम्। झभ ञ। घढधष् । जबगड्रदश् । ख फ छठ थचटतव्। कपय्। श ष सर्। हल् ।
या महानादाच्या पाठोपाठ झालेल्या स्फोटातून प्रचंड मोठा अग्नी निर्माण झाला. या ज्वाळा ब्रह्मांडाची मूलभूत ऊर्जा आहे. म्हणून शिवाच्या डाव्या हातात अग्ग्री दाखविलैला असतो. यातून नंतर पंचमहाभूतांची निर्मिती झाली. महाभूतांच्या मिश्रणातून सृष्टी उत्पन्न झाली.
काहीही निर्माण करण्यासाठी काही तरी वापरावे लागते, काही तरी तोडावे लागते, मोडावे लागते किंवा त्याचे आहे ते स्वरूप बदलावे लागते. आधी केलेले सर्व तोडून मग नवीन आणि पुन्हा हे सर्व मोडून त्यातून नवीनतम करायचे म्हटल्यास सगळेच क्षणाक्षणाला नष्ट करावे लागेल. मग सृष्टी राहणार कशी म्हणून शिवाचा उजवा हात अभय मुद्रेत असतो. जे इष्ट आहे, जे सुष्ट आहे त्याला त्वरित न तोडता तसेच राखण्याचे आश्वासन तो देतो. परंतु जे अनिष्ट आहे त्याचे रूपांतर म्हणजे लय आणि जे दुष्ट आहे त्याचा नाश म्हणजे संहार तो करतो. हे कार्य त्याचे अविरत सुरू असते म्हणून त्यांच्याभोवती फिरण अग्रिगोलकांचे वलय हेच सुचित करत असते. याला 'तिरोभाव' असे म्हणतात.

नावंत तांडव, दशावतार लेखणे, वेरूळ
शिवाचा पाय हे त्याच्या अनुग्रहाचे निर्देशक असते. जर त्याचे दोन्ही पाय टेकलेले दाखवले गेले असते कोणालाच मुक्ती देत नाही असा त्याचा अर्थ झाला असता. शिवाने एक पाय उचलल्यामुळे ध्यास घेतलेल्या मुमुक्षांना तो मुक्ती मार्गावरून जाऊ देतो. त्यासाठी त्याने (शिवाने) त्यांना (मुमु अनुमती दिली आहे हे त्याच्या डाव्या पावलाकडे निर्देश करणाऱ्या डाव्या हातांच्या बोटांवरुन केले जाते. ब्रह्मांडातील दुष्ट शक्तींचा, दुष्ट प्रवृत्तींचा आणि उपद्रवी घटकांचा कधीही समूळ नाश करता येत नाही. त्यांचे फक्त दमन करता येऊ शकते किंवा त्यांच्यावर तात्कालिक नियंत्रण ठेवता येते. त्याच्या पायाखालील व्यक्तीच्या रूपात या दुष्ट शक्तीचे प्रतिनिधित्व केलेले असते. याला 'अप पुरुष' असे म्हणतात. त्यामुळे तांडवाच्या शिल्पाचे उत्पत्ती (डमरू), स्थिती (अभय मुद्रा), (अग्नी), तिरोभाव (प्रभावळ) आणि अनुग्रह (उचललेला पाय) हे पाच गुणधर्म मानले आहे धातूशिल्पांमध्ये दिसणारे हे रूप पाषाणशिल्पांमध्ये मात्र क्वचितच दिसते. पाषाणशिल्पांमध्ये तांडवाची अन्य रूपे कोरलेली दिसतात याचे कारण धातूमूर्ती ओततानाची काही तांत्रिक बंधने येथे नसतात. तसेच पाषाण शिल्पांमध्ये उचललेला पाय पण दाखविताना त्याचा त्रिमितीचा आभास निर्माण करणे तसे अवघडच जाते.
नादंत तांडवाचे एक विलोभनीय शिल्प वेरुळमधील दशावतार लेण्यामध्ये (वेरुळ क्रं. १५) कोरलेले आहे. या शिल्पात नृत्य मुद्रेत असलेला शिव हा आठ हातांचा असून त्याचा डावीकडचा एक आणि उजवीकडचा एक असे कोणत्याही दोन हातांचा विचार केल्यास त्यातून एक नृत्य मुद्रा प्रकटते.
वेरुळ मधल्या विविध तांडव मूर्ती
ललित तांडव -
हे लंकेश्वर लेण्यातील (लेणी क्र. १६) शिल्प असून अत्यंत गतिमान नृत्याचे शिल्पांकन आहे. जवळजवळ आठ फूट उंचीच्या या मूर्तीमध्ये कलाकाराने त्याची प्रतिभा पणाला लावलेली दिसते. गती दाखविण्यासाठी त्याचे हललेले केस, उडणारे वस्त्र याशिवाय त्याच्या डाव्या हातात डमरू दाखवलेला आहे. इतकी गती आहे की पाहणाऱ्याला डाव्या हाताच्या ठिकाणी उजवा हात असल्याचा भ्रम होतो. 
ललित तांडव, लंकेश्वर लेणे
भुजंगत्रासित तांडव साप पाहिल्या नंतर दचकून पाय जसा उचलला जातो त्याप्रमाणे डावा पाय उचलून भुजंग त्रासित ही मुद्रा नृत्यात केली जाते. साधारणपणे रंगमंचीय प्रस्तुतीकरणात मांडी जमिनीला समांतर होईल या उंचीपर्यंत नर्तकाचा पाय उचललेला असतो, या शिल्पात मात्र शंकराची ही मुद्रा असल्यामुळे त्याचा गुडघा, हनुवटीपर्यंत उचललेला दिसतो. हे शिल्प कैलास मंदिरातील प्रदक्षिणा पथावर मुख्य मंदिराच्या दक्षिणेकडील भिंतीवर कोरले आहे
याची कथा अशी कालीचे नृत्य आणि शंकराचे तांडव याची स्पर्धा सुरू झाली. शिवाप्रमाणे कालीने सर्व तांडवांचे प्रकार लीलया करून दाखवले. शेवटी शंकराने नृत्य करताकरता एका पायावर नृत्य सुरू केले आणि उजव्या पायाचा अंगठा हातानी धरून आपल्या कपाळावर टेकवला. ही मुद्रा कालीलाही करणे शक्य होते परंतु स्त्रीसुलभ संकोचाने तिने ते तसे केले नाही. (शिवरामामूर्तीः १९७४१. ३७९). कैलास मंदिराच्या मुख्य प्रवेशद्वारा बाहेरील डावीकडच्या भिंतीवर हे शिल्प आपल्याला दिसते यात शंकराचा उजवा पाय ताठ होऊन त्याच्या खांद्यावर गेल्याचे कोरलेले आहे.
ऊर्ध्वजानु तांडव, कैलासनाथ मंदिर, कांचीपुरम
वीणाधर शिव :-
या मूर्तीमध्ये शंकराच्या हातात वीणा दाखवलेली असते. वेरुळच्या कैलास मंदिराभोवताली असणाऱ्या उत्तरेकडील विथिकेमध्ये हे शिल्प आहे. या मध्ये शंकर पार्वती बसलेले दाखवलेले असून, शंकराने हातात वीणा धरलेली दाखवली आहे. काही मंदिरांमध्ये नृत्य मुद्रेमध्ये सुद्धा शिवाने वीणा धरल्याचे दिसते.
दक्षिणामूर्ती : -
शिवाच्या बसलेल्या मूर्तीमध्ये ध्यानस्थ शिव अशी मूर्ती आपल्याला दिसते. योगशास्त्राचा आचार्य म्हणून शिवाचे हे ध्यान दक्षिण भारतात प्रामुख्याने प्रसिद्ध आहे. काहींच्या मते कला, संगीत व इतर भौतिक शास्त्रे यांचा उपदेश देत असताना शंकराचे तोंड दक्षिण दिशेकडे होते. श्रीमद शंकराचार्यांनी इतरांबरोबर दक्षिणामूर्तींचेही बरेंच स्तवन केले आहे. गुप्तकालीन लकुलीशांशी बरेच साम्य असलेली प्रतिमा दक्षिणामूर्तीची होय. योगशास्त्राचा आचार्य म्हणून शिवाचे हे ध्यान दक्षिणभारतांत विशेष रूपानें प्रचलित आहे. श्री गोपीनाथ राव यांनी या रूपांचे योग, वीणा, ज्ञान आणि व्याख्यान असे चार भेद सांगितले आहेत त्यांचा पुढे विचार करू.


महायोगी शिव, कैलास मंदिर, वेरूळ
वेरुळमध्ये कैलास मंदिराखाली पश्चिम भिंतीवर याचे विराट शिल्प आहे. या शिल्पात झाडाखाली पद्मासना बसलेली, उजवा हात मांडी घातलेल्या उजव्या गुडघ्यावर असून डावा हात डाव्या मांडीच्या गुडघ्यावर जमिनी बोटे असलेल्या स्थितीत (भूमी मुद्रेमध्ये) आहे. एका आसन बसलेली ही शिवाची मूर्ती आहे. निर्माण करणाऱ्या त्या महायोगा समाधी लागली. आता नवनिर्मिती कशी होणार ह्या चिंतेतून अष्टदिश देव धावत आले. शिल्पाच्या वारच्या भागात आपापल्या वाहनांवर देव शिवाला हात जोडून विनंती करताना दिसतात. शिवाच्या खालच्या बाजूला दोन गण दाखवले आहेत. समाधी सोडण्याची त्यातील एक जण ढोल बडवतो आहे तर दुसरा त्याच्या वाद्याचा कर्कश आवाज काढून शिवाला जागे करावयाचा प्रयत्न करतो आहे. या गणांच्या वादनाने अन्य योग्यांची समाधी भंग पावली. शिवाच्या बाजूला गुडघ्याभोवती योगपट्ट गुंडाळलेले योगी दिसतात. भगवान शिव मात्र अविचलित आणि शांतच बसलेले दिसतात.
सप्तस्वरमयशिव :-
आधुनिकतेच्या शिखरावर असलेली मुंबई तेवढीच प्राचीन सुद्धा आहे. याच मुंबईच हृदय समजला जाणाऱ्या परिसरात म्हणजेच परळ गावात एक प्राचीन शिवमूर्ती आहे. परळ गावातील चण्डिकादेवी किंवा बारदेवीच्या मंदिराच्या शेजारीच ही मूर्ती आहे. १९३१ मध्ये रस्त्याचे बांधकाम चालू असताना सापडलेली ही मूर्ती स्थानिकांच्या हट्टामुळे (अर्थात चांगलंच आहे) आजही इथेच आहे. पुरातत्व विभागाच्या माहिती प्रमाणे ही मूर्ती गुप्तकालीन म्हणजेच इसवी सनाच्या पाचव्या किंवा सहाव्या शतकातील असावी.

जवळपास १३७ इंच उंचीची ही मूर्ती ७७ इंच रुंदीच्या भागावर उठावशीर कोरलेली आहे. मध्यभागी मुख्य प्रतिमा, तिच्या डोक्यावर एकावर एक अश्या दोन मूर्ती तर मुख्य मूर्तीच्या खांद्यातून दोन मूर्ती, आणि त्या वरील मूर्तीच्या खांद्यावरून दोन मूर्ती त्रिभंगावस्थेत अश्या एकूण सात मूर्ती नजरेला पडतात. मुख्य मूर्तीच्या पायाजवळ एकूण पाच वादक बसलेले आहेत. सात पैकी सहा मूर्ती ह्या द्विभुज असून, या मूर्तीच्या डाव्या हातात एक हातात कमंडलू आणि दुसरा हात मुद्रा अवस्थेत आहेत. मध्यभागी सर्वात वरची मूर्ती मात्र दहा हातांची आहे. या मूर्तीच्या उजव्या हातात हातात कमंडलू, चक्र, खेटक, तलवार, आणि एक हात मुद्रा अवस्थेत आहे, तर डाव्या बाजूला एक हात अभिषेक मुद्रेत असून इतर हातात धनुष्य, दोन भरीव चक्र आणि एका हातात कमंडलू आहे. एकाही मूर्तीवर मुकुट नसला तरी केसांची जटामुकुट सारखी अतिशय सुंदर आणि वेगळी रचना, डोक्यावर चंद्रकोर, गळ्यात हार, नक्षीदार कटीवस्त्र,कानातील कुंडल, हातात कडे, यांनी युक्त ह्या मूर्ती अतिशय सुंदर दिसतात.काही अभ्यासकांच्या मते मधल्या तीन मूर्ती म्हणजे तमोगुणी शिव, सत्वगुणी विष्णू, आणि राजस ब्रह्मा असावा, तर इतर चार मूर्ती ह्या सद्योजात, वामदेव, अघोर, आणि तात्पुरुष असावेत. तर काहींच्या मते मधल्या मूर्ती ह्या पाश, पशु आणि पती असावे तर इतर प्रतिमा या विद्या, क्रिया, योग आणि चर्या हे शिवसिद्धांताचे लक्षण असावेत. श्री. सी शिवरामन यांनी या मूर्तीला शिवाची सप्तस्वरमय मूर्ती असे म्हणलेले आहे, मात्र मुख्य प्रतिमेपैकी कोणाकडेही कोणतेही वाद्य नसल्याने हा विचार विवादित आहे.
तर पायाजवळ बसलेले वादक हेच शिवाच्या सप्तस्वरमय रुपाकडे संकेत करीत आहेत, त्यामुळं सुरांशी मेळ घातला जाऊ शकतो असेही काहींचे म्हणणे आहे.
हरिहरमूर्ती :-
काही भक्तांच्या मते हरी शिवाय पृथ्वीवर दुसरा देव नाही
तर काही भक्तांच्या मते हर शिवाय दुसरा परमेश्वर नाही
पण मानवाच्या मनातील गोंधळ दुर व्हावा म्हणून हरिहर अवतार धारण केला
त्यांची कृपा आपल्यावर राहो
असे एक शिलालेख दावणगिरी येथे इ.स. १२२४ मधल्या शिलालेखात लिहीलेला आहे.
हरिहरांचे सुंदर वर्णन वायुपुराणांत सापडतें. तेथें असें वर्णन आहे कीं प्रथम बीजरूपानें आदिसर्गिक लिंग तयार झालें, नंतर विष्णुरूप योनीशी त्याच्या संयोगानें हिरण्यमय अंडे निर्माण झाले व त्याच्यापासून ब्रह्मदेव व पुढची सर्व सृष्टी तयार झाली. त्याच पुराणांत अन्यत्र विष्णू डावीकडे असतो असें सांगून'" शिवाला 'पुरुष', 'ज्ञेय', 'सत्य', 'यज्ञफल' व विष्णूला 'प्रकृति', 'ज्ञान', 'अनृत', 'यज्ञ' इत्यादि नांवानें संबोधिले आहे. पद्मपुराणांत सृष्टीचे आदि कारण अशा शिवाच्या लिंगाला ब्रह्मदेव आणि भगाला जनार्दन असें म्हटलें गेले आहे. शिवाबरोबर विष्णूनें स्त्रीरूप धारण करून फिरत राहण्यांची कथा कूर्मपुराणांत ही आहे. याच प्रसंगाने भागवतपुराणांकडेही वाचकांचे लक्ष वेधणें अयुक्तिक होणार नाही. त्या पुराणांप्रमाणें विष्णूच्या मोहिनी रूपांतील सौंदर्यावर आसक्त होऊन 'प्रमुषितेंद्रिय' अवस्थेंत शंकर त्याचे पाठी मार्गेधाऊ लागला. दक्षिण भारतीय परंपरेप्रमाणें शिव आणि मोहिनीच्या संयोगाने जो पुत्र उत्पन्न झाला
तोच मल्याळम् भागाचा संरक्षक व मल्याळी लोकांकडून पूजला जाणारा शास्ता, आर्य, अय्यनार, किंवा हरि-हर-पुत्र या नावांचा देव होय.
सामाजिक ऐक्यासाठी कोरलेल्या शिल्पांमध्ये याचा समावेश करावा लागेल. शैव आणि वैष्णव यांच्यात उफाळलेल्या संघर्षाला उत्तर म्हणून या मूर्तीची निर्मिती झाली. ही दोन्ही वेगळी तत्त्वज्ञाने नसून एकाच वैदिक तत्त्वज्ञानाची ही दोन अंगे आहेत. ह्या उभ्या मूर्तीमध्ये मूर्तीच्या उजवीकडील अंग हे शिवाचे. उजव्या हातात त्रिशूल, डोक्याच्या अर्ध्या भागावर जटामुकुट आणि त्याखाली कोपऱ्यात नंदी ही शिवाची लक्षणे तर त्यातील शिवाच्या डाव्या बाजूला डोक्यावर विष्णूचा मुकुट, डाव्या वरच्या हातात चक्र, डाव्या खालच्या हातात शंख आणि खाली कोपऱ्यात हात जोडून बसलेला मानवी रूपातील गरुड ही सर्व विष्णूची लक्षणे. कैलास मंदिरातील पूर्वेकडील म्हणजे मागच्या विधिकेतील शिल्पपटात बरोबर मधोमध हे शिल्प कोरलेले आहेत.
या काळच्या हरिहराच्या इतर विशाल प्रतिमा मथुरेकर्डे असाव्यात (चित्रे ५७, ५८) कारण त्याची मोठाली दोन मस्तकें मथुरा (सं.सं. १३३; १९३६) व लखनऊच्या संग्रहालयांत ठेवलेली आहेत. काही छोट्या आकाराची डोकी सोडली तर गुप्तकालीन हरिहराच्या प्रतिमेचा एक नमूना प्रयाग संग्रहालयांतील एका सर्वतोभद्र मूर्तीत पाहता येतो. येथे दोघांची मुख्य आयुर्थे त्रिशूलपुरुष व चक्रपुरुषाच्या रूपांत कोरली आहेत. (सं.सं. २९२)
जर एखाद्या व्यक्तीच्या आयुष्यात अडचणी निर्माण करणार्या वाईट शक्तीपासून सोडवणुक करुन घ्यायची असेल तर त्याला हरिहर मुतीची पुजा करण्याचा सल्ला दिला जातो.
भगवान हरिहर यांनीच अयप्पाला जन्म दिला असे मानले जाते. हरिहर संदर्भात आणखी एक कथा सांगितली जाते. या कथेनुसार दुर्गेने वध केलेल्या महिषासुराची बहीण महिषी हिला आपल्या भावाच्या मृत्युचा बदला घ्यायचा होता. तीने भगवान ब्रम्हदेवाची पुजा करुन त्यांच्याकडून वरदान प्राप्त करुन घेतले. त्याप्रमाणे भगवान शिव आणि विष्णू यांच्या संयोगातून होणार्या पुत्राकडूनच तीला मृत्यु येईल. अर्थात महिषीला मारण्यापुर्वी हा मुलगा बारा वर्ष मानव लोकात राहील. अर्थात हा वर मागण्यामागे माहिषीचा एकच विचार होता कि दोन पुरुष देवता एकत्र येउन अश्या पुत्राची निर्मिती होणे अशक्य आहे आणि या मार्गाने आपण एक प्रकारे अजिंक्य झालो आहोत. अर्थात या राक्षसीचा नाश करण्यासाठी भगवान शिव व विष्णु एकत्र आले. शिवशंकर पुरुष रुपात तर विष्णु स्त्रीरुपात मोहीनी अवतार धारण करुन एकत्र आले व त्यांनी एका पुत्राला जन्म दिला ज्याला अयप्प्पा मानले जाते. भगवान अयप्पांना हरिहरसुदन किंवा हरिहरपुत्र असेही मानले जाते. अयप्पा हि केरळमध्ये अतिशय मोठ्या प्रमाणात पुजली जाणारी देवता आहे. भगवान अयप्पांचे पालनपोषण राजा राजशेखर पांडियन आणि कोपेरुंदेवी या निसंतान जोडप्याने केले. अयप्पा धार्मिक आणि नैतिक मुल्यांचे पालन करीत मोठे झाले. त्यांना भगवान शिव आणि विष्णुपासून प्राप्त झालेल्या शक्तीचा उपयोग करुन महिषीला हरवले.
शिव मुर्ती कोरताना त्यांच्या अर्ध्या बाजुला जटा दाखवलेल्या असतात्,तसेच अर्धचंद्र डोक्यावर दाखवलेला असतो, त्यांच्या मस्तकी गंगा वाहताना दाखवलेली असते, तसेच भगवान शिवांचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे तिसरा डोळा अर्धा दाखवला असतो. त्यांनी आपल्या डाव्या कानात सर्पकुंडल धारण केलेले असते. बहुतेकदा हरिहर प्रतिमा चर्तुहस्त असते. शिवांच्या बाजुला एका हातात त्रिशुल, डमरु, अक्षमाला किंवा छोटे हरीण धारण केलेल असते, तर दुसर्या हात अभय किंवा वरद मुद्रेत असतो.
तर विष्णु मुर्ती कोरताना त्यांच्या छातीवर साप दाखवलेला असतो. नागाचे जानवे, कमरेला सर्प मेखला किंवा करदोडा दाखवलेला असतो. त्यांच्या कमरेपासून ते घोट्यापर्यंतचा पाय व्याघ्रचर्माने झाकलेला असतो. भगवान विष्णु मुकुट धारण केलेले असतात, ज्याच्यावर रत्ने धारण केलेली दाखवलेली असतात. त्यांच्या उजव्या कानात मकर कुंडले धारण केलेली असतात. तसेच दंडात केयुर, मनगटात कंकण आणि इतर आभुषणे धारण केलेली असतात. तसेच पिवळ्या रंगाचा शेला धारण केलेला असतो. जर हरिहर मुर्ती चतुर्हस्त असेल तर भगवान विष्णूंचा जो हात वरच्या दिशेन वळलेला असतो, त्या हातात शंख, चक्र किंवा गदा असते तर दुसरा हात कटक मुद्रेत असतो.
हरिहर मुर्तीचे दोन्ही पाय जमीनीवर सपाट टेकलेले असतात. उजव्या पायात बहुतेकदा साप एखाद्या तोड्यासारखा लपेटलेला असतो. तर डाव्या पायात रत्नजडीत पैंजण दाखवलेले असते.
जर हरिहर मुर्तीचे चित्र असेल तर भगवान शिव निळ्या रंगाच्या राखेने त्यांचे शरीर माखलेले असते. निळी राख हे योगी असल्याचे प्रतिक आहे. तर विष्णुंचा भाग निळ्या रंगात रंगवलेला असतो. जो पवित्रतेचे प्रतिक आहे.
८ व्या शतकाच्या प्रारंभी पश्चिमी चालुक्यांनी निर्माण केलेली हरिहर मुर्ती, बदामी, कर्नाटक (सध्या राष्ट्रीय संग्रहालय, दिल्ली )
भारतात हरिहर मुर्ती प्रामुख्याने बादामी लेणी परिसर १ आणि ३, महाबलीपुरमच्या धर्मराज रथ, ओसियां (राजस्थान), हिमाचल प्रदेशमधील बैजनाथ मंदिर आणि ओडिशामधील मुक्तेश्वर मंदिरात बघायला मिळतात. ज्या मंदीरात हरिहर मुर्ती असतात, तिथे उत्सव साजरा करताना एका वर्षी भगवान शिव तर त्यानंतरच्या वर्षी भगवान विष्णु यांचा आलटून पालटून साजरा केला जातो.
हरि-हराची सुमारे चौथ्या शतकांतील मूर्ती विदिशा येथून मिळाली आहे (चित्र ५६). येथे ही अर्धनारीश्वर प्रतिमेंप्रमाणें ऊर्ध्वलिंग दिसतें, पण हात मात्र खंडित आहेत. याच्या थोड्या नंतरची हरिहराची प्रतिमा कलकत्ता येथील बिरला-अकादमी-संग्रहालयांत ठेवलेली आहे. मूर्तीला चार हात असून वरील हातांत त्रिशूल व चक्र आहे आणि खाली अक्षमाला व शंख. शिवाची जटाभार, अर्धचंद्र आणि व्याघ्रांबर ही चिन्हें असून विष्णूकडे सिंह, मुखांकित मुगुट शोभत आहे. हरिहराचे ऊर्ध्वलिंग ही स्पष्ट आहे.
त्रिमुखी शिव.
ह्याला तीन मुखे असतात. त्रिमुखी शिवाची सर्वात प्रसिद्ध प्रतिमा म्हणजे घारापुरी येथील ब्रह्मा-विष्णू-महेश अशी मानली गेलेली शिवप्रतिमा. वास्तविक ही प्रतिमा ब्रह्मा-विष्णू-महेश अशी नसून शंकराच्याच सदाशिव रूपाची आहे.
वेरूळ येथील त्रिमुखी शिव
चतुर्मुख शिव.
ह्याच्या नावाप्रमाणेच ह्याला चार मुखे आहेत. काही संशोधक ह्यालाच सदाशिव (पंचमुखी शिव) असे मानतात ह्याचे पाचवे मुख हे दाखवले नसते व ते आकाशाच्या दिशेने असे मानले जाते.

पाटेश्वर येथील चतुर्मुख शिव
चतुर्मुख शिव :मांढळ,
तहसील उमरेड (जि. नागपूर) येथून मिळालेल्या काहीं सातवाहन-वाकाटककालीनप्रतिमा नागपूर संग्रहालयांत आहेत. त्यांत चतुर्मुखी दिसतो. चारी दिशांकडे पाहणारी चार मुखें याच्या मानेंवर असून डाव्या हातांत दण्ड असावा असें वाटतें. ऊर्ध्वलिंग नेसूच्या वस्त्रानें झाकलेले आहे. प्रतिमा लालसर दगडाची आहे. (* या माहितीबद्दल लेखक नागपूर संग्रहालयांचे अध्यक्ष श्री पी.एम्. मुळे यांचा आभारी आहे. श्री. मुळे यांच्या सहयोगानें या प्रतिमा पाहतां आल्या. अजून या अप्रसिद्ध आहेत.)अष्टमुख शिव :
याच संग्रहालयांतील मांढळची दुसरी प्रतिमा अष्टमुख शिवाची आहे. ही देखील उभयांकित असून हिला दोनच हात असावेत असें वाटते. त्यापैकी आज हयात असलेल्या डाव्या हातांत घट (तुंबी) आहे व तिच्यातून एक लांबट वस्तू निघत असावी असें भासित होतें. हिला चहूबाजूला चार तोंडे तर आहेतच, मागील मुखाला त्रिनेत्र व मिशाही आहेत. हैं अघोरमुख असावे. याशिवाय डाव्या बाहुमूलांवर (तुटलेल्या उजव्या बाहूमुलांवरही तसेंच असले पाहिजे) व दोन्हीं जघांमूलांवर प्रत्येकी एक अशी चार अतिरिक्त मुखेंही दिसतात. जंघामूलांवर दिसणाऱ्या मुखांचा व मांड्यावरील धोतराचा असा खुबीदार जोड बसविला आहे कीं धोतराचा भाग या मुखांवरील उष्णीषासारखाच वाटतो. या प्रतिमेत देखील वरील प्रमाणें वस्त्राच्छादित ऊर्ध्वलिंग आहे. शिवाच्या खांद्यावर जानवेही आहे. शिवाची ही आठ मुखें त्याच्या अष्टमूर्तित्वाकडे संकेत करतात.
एकादश रुद्र, कैलासनाथ मंदिर, कांचीपुरम
ज्या शिल्पातून सगळे तत्त्वज्ञान साकारले जाते, अशा शिल्पांना डॉक्टर गो. बं. देगलूरकर यांचा मते 'बिंब ब्रह्म' असे म्हणतात. याशिवाय अष्ट मुख आणि द्वादश मुख शिव अशीही शिवाची शिले असतात. काही शिल्पांमध्ये सिंहासह शिव कोरलेला असतो.
शिवाचे शिल्पांकन अनेक प्रकारे होते. त्यातील सर्वच प्रकार सर्व मंदिरात दिसत नसल्यामुळे येथे सर्वाधिक प्रचलित आणि संख्येने जास्त असणाऱ्या तसेच सामान्यतः अनेक देवळांमध्ये प्रकर्षनि आढळणाऱ्या शिल्पांचेच वर्णन प्रामुख्याने केले आहे. अकरा रुद्र यांचे एकत्रित किंवा स्वतंत्र शिल्पांकन दिसते. (कांचीपुरम - तामिळनाडू येथील कैलासनाथाचे मंदिर, सिद्धापूर-गुजराथ येथील शिव मंदिर) तसेच अज मुख, अघोर, नीलकंठ, वीणाधर, हनुस्पर्श (पार्वतीच्या हनुवटीला हात लावलेला बालशिव, विषपायी आवक्ष, महेशमूर्ती अशी विविध रूपेही दिसतात. (जोशी : १९७९, पृ.२०२- २०३).
तालागाव (बिलासपूर, छत्तीसगढ) येथे दहाव्या अकराव्या शतकातील रुद्र शिवाची एक उभी असलेली द्विभुज प्रतिमा मिळाली आहे. ही ऊर्ध्वलिंगी असून हातात आयुधे नाहीत. त्यांच्या संपूर्ण शरीरावर विविध प्राणी अंकित केलेले आहेत. छाती, पोट, मांड्या यावर सात मानव मुखे आहेत. गुडघ्याच्या ठिकाणी दोन सिंहाची तोंडे दिसतात. पोट हे महाकुर्माचे रूप, भुवयां ऐवजी मासे, एका विशाल कपाळावर टिळ्याच्या ऐवजी पाल, बुबुळाऐवजी मानवी कवट्या, याशिवाय डोके, कान, लिंग यासारख्या अवयवांवर साप, मोर, मगर वगैरे प्राणीही लहानमोठ्या प्रमाणात दिसतात. डॉ. देगलूरकर झांनी याला 'सर्वभूतवहित्र' असे म्हटले आहे.
नागपूर विद्यापीठानें मांढळ येथे केलेल्या उत्खननांत सातवाहन वाकाटककालीन बरेच अवशेष मिळाले आहेत. त्यांत एक द्वादशमुखी, शिवाची मूर्ती आहे. याचा दगड, घडण व डौल अष्टमुख शिवप्रतिमें प्रमाणेंच आहे. डॉ अजयमित्र शास्त्री यांनी 'महासदाशिव' म्हणून हिला ओळखले आहे. या प्रतिमेंच्या मानेंवर आठ डोकी असून ती चारचा एक थर या प्रमाणे एकांवर एक असलेल्या दोन थरांत दाखविली आहेत. खालील चार तोंडे मुख्य दिशांकडे व वरील उपदिशांकडे आहेत. या शिवाय वरील अष्टमुख प्रतिमेंप्रमाणेंच दोन बाहुमूलांवर व दोन जंघामूलांवर अशी आणखी चार मुखें आहेत. या मुखांना मिशा नाहीत. या प्रमाणें एकूण मुखांची संख्या झाली बारा !! शिवाच्या डाव्या हातांत कमंडलू असावा. त्याच्या शरीरांवर फलकहार, जानवें, कटिबंध, आणि कच्छा दिसतो. ऊर्ध्वलिंग वस्त्राच्छादितच आहे. विष्णूच्या चतुर्व्यहाप्रमाणें मूसानगरचा शिव आपण मागें पाहिला आहे. तसेच या बारामुखीं शिवांचा विष्णूंच्या बारा विभवांशी काही अर्थाअर्थी संबंध नसेल नां?
शिवाच्या अन्य मूर्ती
सदाशिव मूर्ती :-
पाच तोंडाचा व दहा हातांचा शंकर हा 'सदाशिव' या नावाने ओळखला जातो. तसेच अनेक मुखांच्या शंकराच्या मूर्तीलाही सदाशिव म्हटले जाते. अशा वर्णनाच्या काही विशेष मूर्ती आढळतार परंतु साधारणपणे अनेक मुख असणाऱ्या शंकराच्या शिल्पाला सदाशिव म्हणतात. तत्पुरुष, वामदेश अघोर, सद्योजात, आणि ईशान अशी याच्या पाच मुखांची नावे असतात. मूर्तीमध्ये हा तीन किंवा चार तोंडाचा दिसतो. त्याचे समोर मध्यभागी असणाऱ्या मुखाला तत्पुरुष असे म्हणतात. त्याचा डावीकडील वामदेव तर उजवीकडील मुखाला अघोर म्हणतात. डोक्यावरील मुखाला ईशान म्हणतात तर पाचवे मुख जे दिसत नाही त्याला सद्योजात म्हणतात. ही पाच मुखे पंचमहाभूतांचे प्रतिनिधित करतात. यातील डोक्यावरील मुख ईशान हे आकाश तत्त्वाचे प्रतिनिधित्व करत असल्यामुळे ते काही शिल्पांमध्ये दाखवले जात नाही. घारापुरी (एलिफंटा) येथील त्रिमूर्ती या नावाने प्रसिद्ध असलेले शिल्प हे ब्रह्मा, विष्णू, महेश या त्रिदेवतांचे नसून सदाशिवाचे शिल्प आहे. या शिल्पात तीनच मुखे दिसतात आणि डोक्यावरील ईशान दाखवलेला नाही. शिवाच्या डावीकडील तोंडाचे नाव वामदेव. वामदेव म्हणजे परिष्कृत निर्मिती म्हणून याचा चेहरा अत्यंत सुकुमार तरुणाप्रमाणे कोरलेला आहे. त्याचे उजवे तोंड म्हणजे अघोर. यातील अघोर म्हणजे निर्मिती साठी लागणारी ऊर्जा आणि शक्तीचे रूप. हातोडीचा ठोका कठीण पदार्थाबर घालताना दाताखाली ओठ चावून भुवया विस्फारून अत्यंत त्वेषाने तेवढाच नियंत्रित आणि संयमित करून तो ठोका घालावा लागतो याचे ते प्रतीक आहे. या शिल्पातीत अघोराने चावलेला ओठ आणि त्याची वक्र झालेली भुवई यांची साक्ष देतात. या दोन्हीतील समतोल साधणारा निःपक्ष म्हणूनच निर्विकार तरीही निर्मितीचे समाधान दाखवणारा चेहरा हा मधल्या तोंडावर म्हणजे तत्पुरुषाचा असतो, घारापुरीतील हे शिल्प खरं तर अर्धशिल्पच (bust) आहे. शंकराच्या छातीपर्यंतच कोरलेले हे शिल्प आहे. हे शिल्प २१ फूट उीचे आहे. अर्धशिल्पांमध्ये जगातील सर्वात श्रेष्ठ असे हे शिल्प आहे.एकपाद शिव मूर्ती :-

लकुलीश शिव :-
लकुलीश हा शिवाचा एक अवतार समजला जातो. इसवीसनांच्या प्रथम शतकांत किंवा त्यापूर्वी लकुलीश नांवाच्या आचार्याने पश्चिमी भारताच्या कायावरोहण तीर्थाचे ठिकाणी पाशुपतमताची स्थापना केली होती." हे मत हळुहळू इतकें मान्य झाले की लकुलीश हा शिवाचेंच प्रतिक झाला. लकुलिश या शब्दाचा अर्थ लाठी धारण केलेल परमेश्वर असा होतो. खरेतर लकुलीश एक सुधारणावादी शैवपंथीय संत होते, ज्यांना शिवाच्या अठ्ठावीस रुपात स्थान मिळाले.
त्यांच्या मते पाशुपत आणि इतर शैव संप्रदायाची पुन्रबांधणी आणि संस्थापना, सुधारणा करण्याचे श्रेय लकुलिश यांच आहे. तसेच या तज्ञांच्या मते पाशुपत सुत्र खुप आधीच लिहीले गेले होते, पण लकुलिश यांनी त्यांना सर्वसामान्यांना समजेल अश्या सोप्या पध्दतीने भाषांतरीत केले. एकतर पाशुपत सुत्रांची रचना एकंदरीत प्राचीन वाटते आणि त्यात ती सुत्रे कोणी रचले याचा उल्लेख नाही असा या तज्ञांचा दावा आहे. त्यामुळे या सुत्रांची रचना लकुलिश यांनी केलेली नाही असा दावा केला जातो.
पाशुपत संप्रदाय हा सहा मुख्य सिध्दांतापासून बनला आहे. यामध्ये कारण, कार्य, कला, विधि, योग आणि दुखांत हि सुत्र आहेत. लकुलिश यांनी आर्यांच्या आधीच्या काळातील सिंधु संस्कृतीतील कर्मठ परंपरांचे पुनर्संस्थापन केले. तसेच हठयोग आणि तांत्रिक परंपराचे पुननिर्माण केले. तसेच लकुलिश यानी वैदीक, जैन आणि बौध्द धर्माचा हिंसक मार्गाने विरोध केला.
पाशुपत संप्रदाय पाळत असलेली तपस्वी प्रथा :-
पाशुपत संप्रदायी ज्या उग्र प्रथा पाळतात, त्यात दिवसातून तीन वेळा राखेने स्नान करणे, ध्यान करणे आणि ओम मंत्राचा जप करणे, भगवान शिवाची स्तुती आणि आराधना करताना जोरात हसणे, जीभ हासडणे आणि बैलासारखे डुरक्या देणे याचा समावेश होतो.
भगवान शिव यांना समर्पित झालेली व्यक्ती मग ती कोणत्याही जातीची असु देत पाशुपत संप्रदायी होउ शकते. या लोकांचा पोषाख काळया रंगाचा असतो. तसेच शिवाचे दर्शन घेण्याची आणि पुजेची पध्दत विशिष्ट प्रकारची असते. याच पध्दतीने केल्या जाणर्या काही अस्पष्ट सिध्दांतामुळे आणि काही रहस्यमय प्रथा, तसेच विकृत आणि विभिन्न परंपरा यातून कापालिक आणि काळामुख या दोन तांत्रिक पंथाना जन्म दिला गेला.
कापालिक हा शब्द कपाळ या शब्दावरुन आला आहे. कापालिक संप्रदायानुसार भोजन आणि पेयपान मानवी कवटीतून केले पाहिजे असे मानणारे आहेत. तांत्रिक पंथाच्या सर्व प्रथा कापालिक कठोरतेने पाळतात. त्यामध्ये स्मशानामध्ये रहाणे, तसेच पुजापाठामध्ये संभोगातून निर्माण झालेले रक्त, मांस, अश्या पदार्थांचे सेवन केले जाते.
कदाचित कापालिकांच्या पुजेत या गोष्टीचा समावेश हे होण्याचे कारण म्हणजे प्राचीन हिंदु मंदीरात कामशिल्प असतात, याचा अर्थ या संप्रदायाचा हा प्रभाव असावा का ? असा प्रश्न निर्माण होतो.
कालमुख संप्रदाय :-
कापालिक लोकांच्या प्रथा अतिशय कठोर असल्या तरी त्या तुलनेत कालामुख संप्रदायाचा प्रथा तुलनेने सौम्य आहेत. कालामुख संप्रदायिक पुरुष देवाची कि स्त्री देवतेची पुजा करतात, त्यावरुन कालामुख संप्रदायाचे दोन प्रकार पडतात.पुरुष देवाला भजणार्या अनुयायांना सिंहप्रसाद म्हणले जाते तर जे कालामुख स्त्री देवतांची पुजा करतात त्यांना शक्तिप्रसाद म्हणतात. काही पाशुपत संप्रदायी हे तुलनेने उदारमतवादी आहेत. या संप्रदायाचे शिक्षण हेच आधुनिक शैव धर्माचे केंद्र झाले.
लकुलिशाने पुनर्थान केलेल्या शैव धर्माचा प्रभाव सुरवातीला खुप होता, प्रारंभी तो उत्तर भारतात वाढला, नंतर पुर्व भारत, नेपाळ, ओडीशा आणि आसामच्या जंगली भागात एखाद्या वणव्यासारखा पसरला. चौथ्या शतकात लकुलिशाचा शिष्यांचा प्रभाव खुप वाढला, तर पुढे सातव्या शतकात चीनमधून भारतात आलेल्या यात्रेकरु ह्युएन त्संगने पाशुपत संप्रदायासंदर्भात विस्ताराने लिहीले. ह्युएन त्संग लिहीतो कि, पाशुपत संप्रदायीक आपल्या शरीराचर राख माखायचे, आपल्या केसांच्या जटा बांधायचे आणि नग्न असायचे. त्यांना राजकीय संरक्षण मिळाले होते आणि समाजावर त्यांचा खुप प्रभाव होता. चोल राजवटीत तामिलनाडूत लकुलिश लोकप्रिय होते आणि त्यांच्या पंथाची शाखा काळामुख कर्नाटकात राजकीय प्रभाव राखून होती. चोल काळात पाशुपत संप्रदायाचा इतका प्रभाव होता कि जेव्हा चोल अधिपती राजाराजा याने त्याचे अजोबा अरिंजय चोल यांच्या समाधीचे म्हणजे पल्लीपदाईचे प्रशासन पाशुपत संप्रदायिकांकडे दिले होते.
शैव पंथाचे पुनरुथान झाल्यावर खांद्यावर शिवलिंग घेउन नाणार्या भारशिवांना मध्य आणि उत्तर भारतातील वालाटक पंथीयाकडून पाठींबा मिळाला. जवळपास अकराव्या शतकापर्यंत उत्तर भारतात या पंथाचा प्रभाव राहिला. अकराव्या शतकाच्या दरम्यान या पंथाने आपला विस्तार दक्षिण भारतात केला. विषेशतः मनिषी आणि नयनार जे कलाकारी करतात, त्यांच्यात या पंथाचा प्रभाव खुपच वाढला. तामिलानाडूतील सर्व ६३ नयनार संतानी रचलेले मंत्र भगवान शिवांशी संबधीत आहेत. भगवान शिवांची आपल्या भक्तांवर कृपा व्हावी हिच इच्छा त्यात व्यक्त केली आहे. हे मंत्र आजही लोकप्रिय आहेत.
लकुलिशाच्या मुर्ती :-
याच्या प्रतिमेची मुख्य लक्षणें म्हणजे ऊर्ध्वलिंगावस्था व हातांत सोटा. हा कमळावर बसलेला असून नागसेवकांनी कमळाचा देठ घट्ट धरून ठेवला आहे. शिवाला दोनच हात दाखवले असून त्याचा उजवा हात व्याख्यान मुद्रेत आहे तर दुसर्या हातात त्याने लगूड अथवा लाकडी सोटा उचलून धरला आहे. गळ्यात नागरूपी हार असून कपाळी अस्पष्टसा असा तिसरा डोळा दिसतो आहे. हे शिवाचे योगी स्वरूप. ह्याचा एक हात नेहमी वरदमुद्रेत असतो. लकुलीश शिवाची मूर्ती पद्मासनी अथवा उभ्या अशा दोन्ही प्रकारांत सापडते.
लकुलीश शिव प्रतिमा ही बुद्धासारखीच दिसते. किंबहुना बुद्धप्रतिमेवरूनच शिवाचे हे रूप तयार झाले असावे. कित्येक महायानकालीन बौद्ध लेण्यांत पद्मपाणी बुद्धाची अगदी अशीच प्रतिमा कोरलेली आढळते.सभामंडपाच्या डाव्या बाजूला भिंतीवर कासवावर उभी राहिलेली यमुनेची प्रतिमा कोरलेली आहे. एका हातात तिने शंख का फूल असे कायसे धरीले आहे तर दुसरा हात सैलसर असा कमरेच्या बाजूला मुक्त सोडलेला आहे. तिने अगदी तलम वस्त्र नेसलेले नसून यात तिच्या प्रवाहीपणा प्रकट होतो तर बाजूला एक सेविका दाखवलेली असून वर आकाशगामी गंधर्व कोरलेले आहेत.लकुलिश यांची कमल मुद्रा त्यांच्या उच्च अध्यात्मिक स्तराचे प्रतिक आहे. तसेच जागृत लिंग हे त्यांच्या ब्रम्हचारी असण्याचे आणि वीर्य धारण करण्याच्या शक्तीचे प्रतिक आहे. हे लिंग खुपदा डोक्यापर्यंत दाखवले असते, जे तेजाचे प्रतिक आहे.
आपल्या माहितीतील लकुलीशाच्या प्रतिमांत राजस्थानच्या नांद शिवलिंगावर असलेली मूर्ती सर्वांत जुनी आहे. येथे उष्णीषधारी शिव दोन्ही पाय आसनांवर ठेऊन बसलेला दाखविला आहे (रे. चि. सत्तावीस २६).
मथुरा संग्रहालयांत चंद्रगुप्त विक्रमादित्याचे वेळेचा एक अभिलिखित स्तंभ आहे. ज्यावर नग्न आणि मुक्तकेश असा दंडधारी लकुलीश दिसतो (चित्र ५१). मथुरेतूनच मिळालेली जवळजवळ याच काळची दुसरी प्रतिमा लखनऊ संग्रहालयाच्या एका शिलापट्टांवर आहे. येथें तो सोटा घेतलेला ऊर्ध्वलिंग तर आहेच पण मांडी घालून बसलेला आहे व त्याने मांडीभोवती योगपट्ट गुंडाळला आहे.
दंड व ऊर्ध्वलिंग लकुलीशाची चिन्हे होत पण सुरुवातीच्या सर्व प्रतिमात ही समानरूपाने मिळत नाहीत. लकुलीश या शब्दानें त्याच्याजवळ सोटा असणें अपरिहार्य दिसते (लकुलीश, लगुडीश = लगुडेश; लगुड = सोटा). हा सोटा म्हणजे गांधार कलेत मिळणाऱ्या शिवाला गदेचे परिवर्धित रूप असू शकत.
वेरूळ लेणी क्र. २९ मधील पद्मासनस्थ लकुलीश शिवाची मूर्ती
वेरूळ कैलास लेणीतील (लेणी. क्र. १६) उभ्या अवस्थेतील उर्ध्वरेता लकुलीश
सिरपुर, छत्तीसगड येथील नृत्यमग्न लकुलीशाची एक दुर्मिळ मुर्ती
मंदसौर ,मध्य प्रदेश येथे सापडलेली ४ थ्या शतकातील लकुलिशाची मुर्ती ( सध्या राष्ट्रीय संग्रहालय, दिल्ली )
बेंगळुरुच्या सोमेश्वर मंदीरावर कोरलेली मत्स्येंद्रनाथांची मुर्ती
बदामी येथील गुंफेत असलेली चार शिष्यांसह असलेली लकुलीशाची मुर्ती. इथे खाली असलेल्या स्कंदाच्या त्रिशुळातून लकुलिशाची गदा बाहेर निघालेली दिसते.
बोधगया, बिहार येथील दरवाज्याच्या चौकटीवर असलेली सुर्य, शिव आणि लकुलिश यांच्या ७७०- ८१० काळातील मुर्ती ( भारतीय संग्रहालय, कोलकाता)
चंद्रशेखर शिव
चंद्रशेखर शिव हे अतिशय लोभस स्वरूप आहे ज्यात शिव दोन्ही पायांवर समान भार देऊन उभा आहे. ही त्याची समभंग अवस्थेतील मूर्ती त्याचा राजस भाव दर्शविते. व्याघ्रचर्मा ऐवजी पितांबर नेसलेला शिव ह्या मूर्तीत दिसतो.
अलंकारांमध्ये मात्र प्रदेश, कालपरत्वे वैविध्य आढळते. तो बरेच वेळा समभंग स्थितीत सरळ उभा असतो. सोबत उमा असल्यास तिच्या हातात कमळ असते. गोपीनाथ राव असे प्रतिपादन करतात की, दक्षिण भारतातील बऱ्याच पाषाण व धातू प्रतिमा आगमांतील वर्णनाबरहुकूम आहेत, तर बॅनर्जी याबाबत पूर्व आणि उत्तर भारतातील शिवप्रतिमांचे उदाहरण देतात. मात्र देगलूरकर यांच्या मते, एकूणच दक्षिणेत चंद्रशेखर मूर्ती कमी आढळतात. शिवाय दक्षिणेतील शिवप्रतिमांच्या मागच्या हातात परशू आणि मृग असतात, तर इतरत्र त्यांची जागा डमरू व त्रिशूळ घेतात, हा महत्त्वाचा फरक होय. उमासहीत मूर्तींचे पुनः दोन प्रकार पडतात; त्यांपैकी एक उमा व शिवाचे साहचर्य दाखवते, तर दुसरी आलिंगन चंद्रशेखर मूर्ती होय. यातील पहिल्या प्रकारात शिव हा उमेसह असतो, मात्र कधीकधी दोघेही स्वतंत्र पीठांवर असतात. आलिंगन मूर्तीत तीन प्रकारचे वैविध्य आढळते; शिवाने त्याच्या डाव्या हाताने उमेला आलिंगन देणे, उजव्या हाताने आलिंगन देणे आणि तिसरा प्रकार म्हणजे दोघांनीही एकमेकांना आलिंगन देणे. श्रीतत्त्वनिधीतील वर्णनानुसार पार्वती ही त्रिभंगावस्थेतच असायला हवी आणि तिच्या उजव्या किंवा डाव्या हातात एखादे फूल (विशेषत: निलोत्पल कमळ) हवे.
मूर्तीशास्त्राच्या दृष्टीकोनातून जेव्हा आपण ह्या मूर्तीकडे बघतो त्यावेळी शिल्पशास्त्र ग्रंथ, अगमग्रंथ शिवाच्या चंद्रशेखर स्वरूपाची चर्चा करतात. बारकाईने बघितल्यास त्याच्या हस्तमुद्रा, कर्णाभूषणे, अलंकार, वस्त्र, चेहऱ्यावरील भाव आपल्याला ह्या चंद्रशेखर कथेशी एकरूप करतात.

मुद्रा आणि भाव
ही चंद्रशेखर शिव मूर्ती चार हातांची आहे. तिचा पुढचा उजवा हात अभय मुद्रेत असतो आणि पुढचा डावा हात वरद मुद्रेत. कधीकधी पुढचा डावा हात हा कटावलंबित मुद्रेत असतो. मागचे दोन्ही हात हे कर्तरीमुख मुद्रेत असतात. मागच्या उजव्या हातात परशु आणि डाव्या हातामध्ये हरीण असते. या परशूच्या पात्याचे मुख हे बाहेरच्या दिशेला असते तर मृग शिवाच्या चेहऱ्याकडे बघणारे असते.

नंदिकेश्वराच्या अभिनय-दर्पण या ग्रंथाच्या अनुवादात या कर्तरीमुख मुद्रेच्या उत्पत्तीची कथा आली आहे. जलंधर वधाच्या आधी शिव पृथ्वीच्या मध्यावर त्याच्या तर्जनीने कर्तरीमुख मुद्रेत एक वर्तुळ काढतो अशी ह्या मुद्रेची उत्पत्ती सांगितली आहे. पण मुर्तीशास्त्र ग्रंथांमध्ये ह्या मुद्रेची माहिती येते. अंगठा आणि अनामिका हे बरोबर तळहाताच्या मध्यावर आणून अंगठ्याने अनामिका धरलेली असते आणि तर्जनी आणि मध्यमा एकमेकांपासून लांब, कात्रीच्या स्वरूपात असतात.
या मुद्रेचे अनेक अर्थ होतात परंतु चंद्रशेखर मूर्तीशी जर या मुद्रेचा संबंधातील अर्थ घ्यायचा झाला तर या मुद्रेचा आणि त्या मुद्रेत धारण केलेल्या आयुधांचा एक विशिष्ट अर्थ प्रतीत होतो पण त्याची चर्चा आपण भविष्यातील लेखांमध्ये करणार आहोत.
चंद्रशेखर मूर्ती ही मुळातच सोळा वर्षीय तरुणाप्रमाणे दाखवली जाते. त्याच्या चेहऱ्यावर तरुणाईचे तेज तर असतेच, सोबत शांत, गहिरे भावही स्पष्ट दिसतात.
अलंकार आणि आभूषणे
शिवाच्या जटांची विशिष्ट केशरचना चंद्रशेखर या मूर्तीतून दिसते. काही जटा ह्या डावीकडे, काही उजवीकडे आणि काही मधून मागे गेलेल्या एकावर एक अश्या पद्धतीने व्यवस्थित बांधलेल्या असतात. हा जटामुकुट सर्पबंधाने बांधून अलंकरणांनी सुशोभित केलेला असतो. खऱ्या अर्थाने ह्या मुकुटाचे सौंदर्य खुलते ते बारीक पण तेजस्वी चंद्रकोरीने. खरंतर डोक्यावर चंद्रकोर धारण केलेला म्हणूनच ह्या मूर्तीला चंद्रशेखर शिव असे म्हणतात.
कर्ण अलंकारांमध्ये, एका कानात जी कर्णभूषणे असतात त्यांना रत्नकुंडल, शंखपत्र किंवा पद्मपत्र म्हणतात. दुसऱ्या कानातील कर्णभूषणांना मकरकुंडल किंवा पत्रकुंडल म्हणतात.
गळ्यात मोत्याचे मुक्ताहार असावेत, रत्नांनी युक्त रत्नाहार असावेत. या हारांना सुशोभित करणारी पदके असावीत. डाव्या खांद्यावरून येणारे यज्ञोपवित असावे. याशिवाय छन्नावीरा आणि उदरबंध असावे. दंडामध्ये केयूर आणि हातामध्ये कटक असावेत. बोटं अंगठ्यांनी अलंकृत असावीत आणि पायामध्ये नुपूर असावीत असे मूर्तीशास्त्र सांगते.
पुराणांतील चंद्रशेखर
चंद्रशेखराच्या मूर्तीचे विशेष आपण बघितले, पण या मूर्तीत हे अलंकार कसे आले आणि मग शिव जे धारण करतो तो सर्प, व्याघ्रचर्म, चिताभस्म गेले कुठे? या प्रश्नांची उत्तरे शोधण्यासाठी या कथांचा आधार घ्यावा लागतो. पुराणकथा या जरी मिथक सांगत असल्या तरी त्यांच्या सहाय्याने प्रतिमेचा, शिल्पाचा किंवा मूर्तीचा रसास्वाद घेताना अधिक आनंद होतो. त्यामुळे त्यांचे संदर्भ हे कलात्मक दृष्टीने संकल्पना समजवून घेण्यास सहाय्यक असतात. शिवपुराणामधील पार्वती खंडामध्ये या चंद्रशेखर रूपाची छोटीशी कथा येते.
शिव-पार्वतीचा विवाह निश्चित होऊन दोन्हीकडे लग्नाची तयारी सुरु आहे. शिव परिवारात लग्नाची तयारी करण्यासाठी तशी व्यक्ती किंवा स्त्री नसल्याने सप्तमातृकाच त्यांच्या त्यांच्या परीने विविध गोष्टी शिवापुढे आणून ठेवतात. शिव त्याच्या स्वाभाविक वेषातच जायचे ठरवतो. पण अंगाला फासलेले चिताभस्म स्वतःहून चंदनात परावर्तीत होते. कानातील सर्प मनोहारी कुंडलांमध्ये तर हातातले सर्प केयुरांमध्ये परावर्तीत होतात. अंगावर खेळणारे साप विविध रत्न-मौतिक आभूषणे बनतात. चर्मवस्त्र पितांबर बनते. भालप्रदेशावरील तिसरा नेत्र शुभ तिलक बनतो. त्याच्या जटांचा मुकुट होतो, चंद्रमा स्वतः जटामुकुटात विराजमान होऊन अधिक तेजस्वी होतो आणि शिवाच्या चंद्रशेखर स्वरूपाचे दर्शन होते.
हे छोटेसे कथा वर्णन आपल्या चेहऱ्यावर हलके स्मित उमटवून जाते. आता या वर्णनातील प्रसंग आणि मूर्ती एकत्रित पहिली की विसंगती वाटत नाही. तात्पर्य इतकेच की कथेचा भावार्थ लक्षात घेऊन मूर्तीचे परीक्षण करताना त्या मूर्तीची निर्मिती, त्या मूर्तीमधील तत्त्वज्ञान यांची ओळख पटायला लागते. मूर्तीतील कलेचा खरा आस्वाद घ्यायला सुरुवात होते.शिवपार्वती :-


धरुनी मृदू गाल, चुंबना घेई
ते कौतुक पाहुनी हासे अंबाबाई
श्रीसांब जगादिस्तंभ, गौरी हेरंभ जयाच्या अंकी
उद्धार करा मी, रुतलो या भवपंकी
देवी जैसे का स्वरूप तुझे ।
तैसे हे नित्य नूतन देखिजे ।
गीतातत्त्व ॥ ज्ञा. १.७१ ॥


मागच्या बाजुला असलेले उमा महेश्वर
उमा महेश्वराचे प्राचीन अंकन, कुषाण राजा कनिष्क याचा वारस, हुविष्कच्या नाण्यावर येते. डॉ. मधुकर ढवळीकर यांच्या भारतीय नाणकशास्त्र मध्ये शिव आणि उमा यांची हुविष्कच्या नाण्यावरील अंकनाबद्दल माहिती मिळते. या नाण्याच्या दर्शनी बाजूस शिरस्त्राण आणि अलंकारांनी युक्त राजाचा अर्धपुतळा आहे. त्याच्या हातामध्ये राजदंड आहे. नाण्याच्या कडेने ग्रीक लिपीमध्ये शावनानो शाओ उएष्की कोशानो असा लेख आहे. दुसऱ्या बाजूस, शिव आणि उमा एकमेकांच्या समोर उभे आहेत. शिवाच्या मागे प्रभावलय आणि डोक्यावर जटाभार आहे. अंतरीय नेसले असून शिव चतुर्भुज आहे. डाव्या हातामध्ये त्रिशूळ, मृग (?) आणि उजव्या हातामध्ये अंकुश आणि कमंडलू आहे. उमेने ग्रीक पद्धतीचा वेश परिधान केला असून ती द्विभुज दाखवली आहे.


उमा महेश्वर या दम्पतीच्या आलिंगन मूर्ती भारतभर सापडतात. उमा महेश्वर आलिंगन मूर्ती या स्थानक म्हणजे उभ्या, तर कधी आसनस्थ म्हणजे बसलेल्या असतात. शिल्पकारांनी या मूर्ती घडवताना वापरलेल्या वेगवेगळ्या रचनात्मक पद्धती या शिल्पांमधून बघायला मिळतात.
स्थानक म्हणजे उभ्या शिल्पामध्ये उमा महेश्वर त्रिभंग स्थितीत उभे असतात. सुंदर वस्त्रे दम्पतिनी परिधान केलेली असतात. आभूषणे आणि अलंकार यांनी दोघांचे देह शोभिवंत असतात. पार्वतीची विलोभनीय केशसज्जा असते आणि शिवाच्या डोक्यावर सुव्यवस्थित असा जटामुकुट असतो. चंद्रशेखर शिव काही शिल्पांमध्ये दाखवतात. उमा द्विभुज असून तिचा उजवा हात शिवाच्या खांद्यावर असतो आणि दुसऱ्या हातामध्ये नीलोत्पल किंवा पुष्प असते. क्वचित उमेच्या दुसऱ्या हातामध्ये आरसाही असतो. शिव चार हातांचा दाखवतात. रूपमंडन या ग्रंथामध्ये आलिंगन मूर्तीचे वर्णन आले आहे. त्याच्या मागच्या दोन हातांमध्ये त्रिशूळ आणि सर्प असतो तर मागच्या हातामध्ये कधी डमरू किंवा कपाल धरलेला दाखवतात. पुढच्या दोन हातांमधील उजव्या हातामध्ये कधी पुष्प असते तर कधी मातुलिंग किंवा क्वचित अक्षमाला ही दाखवतात. शिवाचा डावा हात उमेला आलिंगन देणारा असतो. काही शिल्पांमध्ये उमेच्या खांद्यावर शिवाचा हात स्थिरावलेला दाखवला आहे.

या आलिंगन मूर्तीमध्ये उमा महेश्वर एकमेकांच्या डोळ्यात बघत असतात, त्या दोघांनाही जणू काही त्याच्या आजूबाजूला असलेल्या संसाराचा पूर्णतः विसर पडला आहे. सलज्ज पार्वतीच्या नयनांचे सुख अनुभवण्यासाठी शिव आपल्या हाताच्या बोटांनी तिची हनुवटी हलकेच वर करीत आहे, अशी शिल्पे दैवी शृंगार रसाचे दर्शन घडवतात. उमा महेश्वरांच्या चेहऱ्यावरील स्मित, आत्मिक आनंद, डोळ्यांचा कटाक्ष, हातांचा स्पर्श, देहबोली हे सर्व विभाव या शिल्पांमधून शृंगार ही भावना प्रकट करतात. जगन्माता आणि पिता यांचा हा दैवी शृंगार एका अलौकिक अनुरागाचे मंत्रमुग्ध करणाऱ्या प्रतिक रूपात शिल्पबद्ध झाला आहे.

उमामहेश्वरं वक्ष्ये उमया सह शङ्कर |
मातुलिङ्गं त्रिशुलश्च धरते दक्षिणे करे ||
आलिङ्गीतो वामहस्तें नागेन्द्रं द्वितीये करे |
हरस्कन्द उमाहस्ते दर्पणो द्वितीये करे || (रूपमंडन – 28)
पत्नी उमा, शंकरासोबत आहे. ज्याच्या उजव्या हातामध्ये मातुलिंग आणि त्रिशूल आहे. डाव्या हाताने उमेला आलिंगन दिले आहे आणि दुसऱ्या हातामध्ये नागेंद्र आहे. उमेचा एक हात शिवाच्या स्कंदावर (खांद्यावर) स्थिरावला आहे आणि तिच्या दुसऱ्या हातामध्ये दर्पण आहे.

१. कुंभेश्वर, गौरिधारा (नेपाळ) येथील बाराव्या शतकातील उमामहेश्वराच्या मूर्ती उभयता चतुर्भुज आहेत.
२. नेपाळ येथीलच आणखी एका शिल्पात शंकर अठरा हातांचा असून पार्वती मात्र द्विभुज आहे. ही मूर्ती सध्या जर्मनीत आहे.
३. कनौज (उत्तर प्रदेश) येथील पुरातत्त्वीय वस्तुसंग्रहालयातील प्रतिहारकालीन मूर्ती. यात पार्वतीच्या मांडीवर बाळ स्कंदही असून ही मूर्ती बरीचशी भंगलेल्या अवस्थेत आहे.
४. उत्तर प्रदेशातील अलाहाबादजवळ येथील गुप्तकालीन मूर्ती. येथे शिव आणि पार्वती दोघेही द्विभुज असून पादपीठावर कुमारगुप्ताच्या काळातील लेख कोरला आहे.
५. पाटणा (बिहार) वस्तुसंग्रहालयात काही उमामहेश्वर प्रतिमा आहेत.
६. छत्तीसगढमध्ये मिळालेल्या काही मूर्तींमध्ये पार्वती चतुर्भुज आहे. अशी काही शिल्पे मल्हार संग्रहालय, बिलासपूर आणि आय. के. एस्. युनिव्हर्सिटी संग्रहालय, खैरागढ येथे आहेत.
७. गौरीशंकर मंदिर, भेडाघाट, मध्य प्रदेश येथे गौरीशंकर मंदिरात वृषभारूढ शिवपार्वती आहेत.
८. वृक्षाखाली बसलेले उमामहेश्वर या प्रकारची एक प्रतिमा भरतपूर, राजस्थान येथील संग्रहालयात असून एक इंदूरच्या संग्रहालयात आहे.
९. वाराणसी, खजुराहो या भागांमध्ये लिंगारूढ उमामहेश्वराच्या प्रतिमा प्रचारात असाव्यात. अशा प्रकारच्या प्रतिमा कोलकाता, वाराणसी (संस्कृत विश्वविद्यालय संग्रहालय), लखनऊ आणि अलाहाबाद येथील संग्रहालयात आहेत.
१०. मार्कण्डी (जि. गडचिरोली), महाराष्ट्र येथे एक सोमास्कंदाची प्रतिमा आहे. त्यात शिव आणि पार्वती हे एकाच आसनावर, पण वेगवेगळे बसलेले असून बाळ कार्तिकेय मध्ये उभा आहे.
११. वेरूळच्या कैलास लेण्यात, गाभाऱ्यासमोरील अंतराळाच्या दक्षिण भिंतीवर नंदीवर बसलेले सोमास्कंद शिल्प आहे.
१२. तंजावरच्या बृहदीश्वर मंदिरात एक उमामहेश्वर प्रतिमा आहे. तिचे आटपाडी (जि. सांगली) महाराष्ट्र येथील प्रतिमेशी बरेच साम्य आहे.
१३. मायावरम् (तमिळनाडू) येथील मयूरनाथस्वामी मंदिरात एक सुंदर उमामहेश्वर प्रतिमा आहे.
१४. कर्नाटकात अंगूर (जि. बळ्ळारी) आणि हवेरी (जि. धारवाड) येथे उमामहेश्वर प्रतिमा आहेत.
१५. ऐहोळे, कर्नाटक येथे एक उमामहेश्वर प्रतिमा आहे.
१६. त्रिवेंद्रम येथील कला विद्यालयात असलेली प्रतिमा हस्तिदंती असून शिवपार्वतीसह नंदी, बाल स्कंद व गणेश हेदेखील आहेत.
१७. महाबलिपुरम् येथील धर्मराज रथात सोमास्कंदाची उत्कृष्ट मूर्ती आहे.
उमामहेश्वर आलिंगन मूर्ती-
उमामहेश्वर या शिल्पामध्ये नंदीवर आरूढ शंकर आणि पार्वती ज्यामध्ये दोघांचेही दोन्ही पाय नंदीच्या एकाच बाजूला (दर्शनी बाजूला) सोडलेले दिसतात. शंकराचा डावा हात पार्वतीच्या कमरेभोवती असून त्याने तिला एक हलके आलिंगन दिलेले असते. या शिल्पाला उमामहेश्वरालिंगन मूर्ती असे म्हणतात. कैलास मधील दक्षिणे-कडील व्हरांड्यात हे शिल्प आहे.
उमामहेश्वर, कैलास मंदिर, वेरूळ
वेळापुर येथील उमा-महेश्वर मुर्ती :-
मुख्य गाभा-यामध्ये मध्यभागी शिवलिंग आकारामध्ये शिवलिंगाच्या अर्ध्या अर्ध्या स्वरूपाला मूळ एकाच शिवलिंगात शिवपार्वतीच्या स्वतंत्र पूर्ण मूर्ती आहेत. ती मूर्ती अर्धी नसून शिवलिंगाच्या दोन भागांमध्ये आलिंगन स्वरूपात आहेत. शिव व शक्ती ह्या लिंग स्वरूपात एकरूप असल्याने तेथे शिवपार्वती स्वरूपातील एकलिंगामध्ये प्रकट आहेत. त्यामुळे त्या मूर्ती शिवपार्वती, उमामहेश्वर अर्धनारी नटेश्वर, शिवशक्ती अशा नावांनी पूज्य मानल्या गेल्या आहेत. शिवाची मूर्ती चतुर्भुज आहे. जटेमध्ये उजव्या बाजूस सूर्य व डाव्या बाजूस चंद्र कोरलेले आहेत असे वाटते. विश्वातील सर्वांत तेजस्वी रत्न जटेमध्ये धारण केलेले आहे. कपाळाच्या वर जटेखाली मुंडमाळा बांधलेल्या आहेत. शिवाचा चेहरा ध्यानमुद्रेत, नाजूक हास्य असलेला, सुंदर आहे. त्याने कानामध्ये कुंडले धारण केलेली आहेत. मूर्ती गळ्यापासून खाली पायांपर्यंत सुवर्णालंकाराने नटलेली आहे. अलंकार नाजूक आकारात पाषाणामध्ये कोरलेले आहेत. बोटावरील नखे व रेषा आणि लहान कोरलेली जटेची केशरचना कोरीव आहे. शिवाच्या उजव्या हातामध्ये त्रिशूळ व दुस-या हातामध्ये जपमाळ घेतलेली आहे. जपमाळेचा अंगठा तुटलेला असून त्यामध्ये चांदीसारख्या धातूचे हाड पाहावयास मिळते. म्हणतात, की अफझलखानाच्या स्वारीच्या वेळेस मूर्तीचे संरक्षण व्हावे म्हणून पूर्वजांनी मूर्ती समोरील बारवेत ठेवली. त्यावेळी तिला थोडी इजा पोचली व नंतर तिची पुन्हा प्राणप्रतिष्ठा करण्यात आली.
शिवाने डाव्या बाजूचा हात पार्वतीच्या डोक्यावरील अंबाड्याच्यावर ठेवलेला आहे. त्याने हातामध्ये पाच फड्या असलेला शेषनाग पकडलेला आहे. दुस-या हाताने पार्वतीला कमरेला आलिंगन दिलेले आहे. उजव्या हातात त्रिशूल असून दुसरा हात आशिर्वादात्मक उभा आहे. अंगठ्यात जपमाळ असून अंगठा, अनामिका, करंगळीचा छेद गेला आहे. पार्वतीमातेची मूर्ती नाजूक चेहरा असलेली, उजवा हात शिवाच्या खांद्यावर आलिंगन दिलेला आहे. दुस-या हातात कमळ व पाश घेतलेला आहे. पार्वतीच्या दोन हातांमध्ये बांगड्या, बोटांमध्ये अंगठ्या, गळ्यामध्ये विविध हार, पायात जोडवी, पैंजण वगैरे दागिने कोरलेले आहेत. तीमधून जुनी अलंकारकला पाहण्यास मिळते. नाकामध्ये नथ घालण्यासाठी छिद्र ठेवलेले आहे. इतके नाजूक काम मूर्तीमध्ये केले आहे. अंबाडा ही केशरचना बारीक कलाकुसरीने साधली आहे. तिच्या कानात कर्णफुले पाहण्यास मिळतात. पार्वतीचा चेहरा, नाक, डोळे बघितल्यावर वाटते, की साक्षात पाहते अशी शिवलिंग आकारात शिवशक्ती एकरूप दाखवल्या आहेत. शंकरमूर्ती दोन्ही पायावर उभी असली तरी तो डाव्या पायावर रेलला आहे व उजवा पाय किंचीत सैल आहे. पार्वती डाव्या पायावर देहुडाचरण मुद्रेत उभी आहे. उजव्या तूळ पायावर चक्र आहे. या चक्रामुळेच या गावास एकचक्रनगर नाव असावे व येथे भिम-बकासुराच्या युद्धात बकासुराचा वध झाला असावा व त्यानंतर या गावाचे नांव वेळापूर झाले असावे असाही समज येथे आहे. हे मंदिर गजलक्ष्मीस अर्पण केले आहे.

श्री अर्धनारी नटेश्वराच्या मूर्तीची रचना अत्यंत कोरीव असून ही मूर्ती सालंकृत आहे. शिल्पकलेच्या दृष्टीने अत्यंत उच्चप्रतीची शिल्पकृती आहे. मूर्तीकाराने मूर्ती कोरताना वस्त्रांऐवजी अलंकाराचा वापर खुबीने केला आहे. अत्यंत देखणी अशी ही मूर्ती १.१५ मीटर उंचीची आहे. तेथेच पार्वतीचे वाहन घोरपड आहे व शेजारी सर्वांत प्रथम पूज्य अशी गणेशाची मूर्ती आहे. त्या मूर्तीचे काम अतिशय नाजूक आहे.
वृषवाहन (Vrushvahan)
शिव पार्वती यांचा विवाहानंतर संसार सुरू झाला, स्वाभाविकच पती- पत्नींच्या मनोरंजनाचेही कार्यक्रम सुरू झाले. शंकर पार्वती सारिपाट खेळावयास बसले. नवविवाहितांच्या मानसिकतेप्रमाणे सुरुवातीचे डाव शंकर मुद्दाम हरत राहिले. एकेक गोष्ट पणाला लावत पार्वतीच्या आग्रहाने त्यांनी त्यांच्या प्रिय नंदीलाही पणास लावले आणि हरले. नंदीला घेऊन जायला पार्वतीची दासी गेली आणि तिने त्याला कानाने ओढून नेत असल्याचे कलाकाराने दाखविले आहे. बलाढ्य नंदी आता दास झाला आहे हे कळल्यावर शिवाच्या काही गणांनी त्याला त्रास द्यावयाला सुरुवात केली. कोणी शेपूट चावत आहे तर कोणी शिंग धरत आहे, तर तो जाऊ नये म्हणून कोणी त्याचे पाय धरत आहे. अन्य गण नंदीच्या दहशतीतून मुक्त झाल्यामुळे त्यांनी एकमेकांवर हल्ले सुरू केले. कोणी दुसऱ्याचे केस उपटतो आहे तर कोणी मुष्टिप्रहार करतो आहे, कोणी आपला पृष्ठभाग उघडा करून दाखवितो आहे, तर कोणी चक्क वाकुल्या दाखवितो आहे, वर्गातून शिक्षक बाहेर गेल्यानंतर बालवाडीमध्ये आपणही हेच करत नव्हतो का ?
शिल्पामध्ये वरील भागात खेळाला वेगळीच कलाटणी मिळालेली कलाकाराने दाखवली आहे. हातात फासे घेऊन अजून एक शेवटचा डाव खेळायचा आग्रह शिवाने केला. पार्वतीच्या लक्षात आले की हा अंतर्यामी महादेव आतापावेतो हरलेले सर्व काही परत मिळविणार, म्हणून तिने डाव सोडून जायची तयारी केली. तिच्या उठण्याच्या हेतूचे शिल्पांकन कलाकाराने तिच्या डाव्या हाताखालील उशी दबली गेली असल्याचे दाखवून केले आहे. तसेच तिचे डावे ढोपरही सरळ आहे. तिचा उजवा हात विस्मय मुद्रेमध्ये आहे. जणू काही ती शिवाला विचारते आहे, "काय देवा, हे तुम्हाला शोभते का ? काय काय डावावर लावायचं आणि कोणचे दान पडणार हेही तुम्हीच ठरविणारे, माझी काय फजिती करण्यासाठी हा आग्रह सुरू आहे का? " भगवान शंकराची मुद्रा मात्र अत्यंत बोलकी आहे. ते म्हणत आहेत की कोण जिंकलं किंवा कोण हरलं याच्यासाठी खेळ खेळला जात नाही.खेळ तर केवळ खेळासाठी असतो. एवढ्याशा कारणाने खेळ कधीही अर्धवट सोडता कामा नये कारण हा केवळ सारिपाट नव्हे तर संसाराचाच खेळ असतो.
रूसलेली पार्वती आणि शांत शिव :-
गङ्गे च यमुने चैव गोदावरि सरस्वति ।
नर्मदे सिन्धु कावेरि जलेऽस्मिन् संनिधिं कुरु ॥
मंगलस्नानादिक कर्मांमध्ये गंगा, यमुना, गोदावरी, सरस्वती, नर्मदा, सिंधू आणि कावेरी यांचे अवाहन करून आपल्याकडे असलेल्या जलामध्ये या नद्यांच्या पवित्र जलाचा अंश उतरावा आणि या सप्त पवित्र नद्यांच्या सानिद्ध्यात हे जल पवित्र होवो, अशी आपण कामना करतो. केवळ गंगा नदीच्या संदर्भात म्हणायचे झाले तर, गंगा शब्दाची व्युत्त्पती पुढीलप्रमाणे सांगितली आहे –
गम्यते प्राप्यते मोक्षार्थिभिरिती गङ्गा
म्हणजे मोक्षार्थी जिच्याकडे जातात ती गंगा.
भौगोलिकदृष्ट्या गंगा नदीचा उगम गंगोत्री, टेहरी – गढवालमध्ये होतो. या ठिकाणाला पुराणामध्ये गोमुखी म्हटले आहे. इथून गंगेचे अनेक प्रवाह विविध शाखांना जाऊन मिळतात आणि गंगा सागराला जाऊन मिळेपर्येंत तिच्या विविध स्वरूपाचे दर्शन आपल्याला होते.
मोक्षदायिनी गंगा नदीचे अवतरण या पृथ्वीतलावर केव्हा झाले, या काळामध्ये अनेक मतमतांतरे आहेत. काही पुराणांमध्ये वैशाख शुद्ध तृतीया ही तिथी मानली आहे. काही पुराणांमधून कार्तिक पौर्णिमा ही तिथी येते. पण काही पुराणांनुसार, ज्येष्ठ शुद्ध १०. ही तिथी लोकांमध्ये अधिक प्रचलित झाल्याने आजच्या तिथीला म्हणजेच ज्येष्ठ शुद्ध १०. ला गंगेचे पृथ्वीवर अवतरण झाले असे मानतात.
गंगा अवतरणाला कारणीभूत होता भगीरथ. या भगीरथाने त्याच्या घोर तपोबलाने देवी गंगेला पृथ्वीवर आणले. एकार्थी ती भगीरथाची कन्या झाल्याने गंगेला भागीरथी हे नाव गंगेला प्राप्त झाले. गंगा पृथ्वीवर अवतरीत होण्याचा प्रसंग वेगवगेळ्या कथा भागांतून आपल्या समोर येतो. महाभारतातील वनपर्वात गंगा अवतरणाची कथा येते. गंगा प्रत्यक्ष भूतलावर येणे हा दिव्य अनुभूति देणारा एक सोहळा म्हणता येईल. याचे कारण भगीरथाचे तपाचरण, त्या तपावर गंगेचे प्रसन्न होऊन पृथ्वीवर येणे, गंगेचा प्रचंड प्रवाह पृथ्वीवर हळुवार उतरवणे, तिच्या प्रवाहाची तीव्रता कमी करण्यासाठी भगवान शंकरांनी तिला आपल्या जटेमध्ये धारण करून तिला सप्तधारांनी पृथ्वीवर सोडणे अश्या अनेक दिव्य घटनांचा समावेश या एकाच प्रसंगामधून उलगडतो. या संपूर्ण प्रसंगातील नाट्य भारतीय परंपरेतील प्राचीन शिल्पांमध्ये शिल्पकाराने साकारले आहे. गंगेच्या मानवी स्वरूपातील अनेक मूर्ती आपल्याला बघायला मिळतात.
भगीरथाने दीर्घ प्रयत्न करून आपल्या पूर्वजांच्या उद्धाराकरता स्वर्गातून गंगेला आणण्याच उपक्रम केला, वेरुळ येथील कैलास मंदिराच्या प्रवेशद्वाराच्या डाव्या बाजूला गंगावतरणाचे विलक्षण शिल्प कोरले आहे. डाव्या कोपऱ्यातील तप करणाऱ्या भगीरथाच्या तपश्चर्येने गंगेचे अवतरण झाले आहे. ती शिवशंकराच्या खांद्यावर आरूढ आहे, श्रीशंकराने आपली एक बट मोकळी करून गंगेला प्रवाही केले आहे. जन्हु राजाने तिला अडवली. शिल्पामध्ये डावीकडे जन्हु राजा बसलेला दिसतो. त्याची समजूत काढल्यावर त्याने तिला न गिळता आपल्या कानातून वाट काढून दिली. त्याला कानातून ती पुन्हा वाहू लागली. शिल्पाच्या खालच्या बाजूला मुक्तीची वाट पाहत बसलेले सगरपुत्र दिसतात. गंगेच्या पावन स्पशनि त्यांना मुक्ती मिळाली. कलाकाराची कल्पकता मात्र या शिल्पात कोरलेल्या पार्वतीमुळे उठून दिसते. तिला वाटले की तिच्या नवऱ्याने सवत आणली म्हणून ती चिडते, रुसते. शंकराच्या हे लक्षात आल्यावर त्याने तिला समजवण्याचा प्रयत्न केला तर ती त्याचा हात झिडकारताना दाखवली आहे. तरीही तो तिची हनुवटी उचलून तिला जणू काही हे सांगतो की, अगं वेडाबाई ही सवत नाही, तिच्यावर उगीच रागावू नकोस. भरतभूमीवर घडणाऱ्या या अभूतपूर्व सोहळ्याला डोळे भरून पाहा, केवळ सगरपुत्रांनाच नव्हे तर कोट्यवधी मानवांना शतकानुशतके मुक्ती देण्याकरता, भारताला सुजलाम् सुफलाम् करण्याकरता ही पावन गंगा आज पृथ्वीवर अवतरते आहे तिचे स्वागत कर. पार्वती मात्र संतापाने काहीही ऐकण्याच्या मनस्थितीत नाही. शिवाचा हात ती त्वेषाने झिडकारते आहे. कोण्या मूखनि तिच्या तोंडावरच घणाचा घाव घातल्यामुळे तिच्या चेहऱ्यावरील क्रोधित मुद्रा मात्र आज दिसू शकत नाही.
गंगेचा प्रवाह आणि तिचे भूतलावरील अवतरण यांची अनुभूती देणारा एक शिल्पपट, UNESCO च्या जागतिक वारसा असलेल्या महाबलीपुरम येथे आपल्याला अनुभवायला मिळतो. शिवाच्या गंगावतरण शिल्पातही शिवाच्या जटांमध्ये गंगेचे आगमन होताना दाखवले जाते. महाबलीपूरम येथील शिल्पपटामध्ये गंगेचे स्वतंत्र शिल्प दिसत नाही. ती जलाच्या रूपात प्रवाहित होत असल्याचा आभास या शिल्प कथेतून निर्माण करण्याचा प्रयत्न शिल्पकारांनी केलेला आहे.
तामिळनाडू राज्यात चेन्नईपासून ६० कि.मी. अंतरावर सागर तटावर महाबलीपुरम हे एक पूर किंवा नगर वसलेले आहे. इ.स. सातव्या शतकापासून पल्लव राजवंश आणि त्यांच्या नंतर चोल राजवंश येथे राज्य करीत होते. या महाबलीपूरमच्या भूमीवरच एक सुंदर शिल्पपट आहे तो म्हणजे गंगावतरण. या शिल्पपटाला अर्जुनाची तपश्चर्या असेही म्हणतात.
दोन मोठ्या शिलाखंडांचा अतिशय कल्पकतेने वापर करून शिल्पकारांनी साक्षात गंगा अवतरणाचा प्रसंग प्रस्तुत केला आहे. गंगावतरण हा शिल्पपटाची रचना अतिशय कलात्मक आणि नैसर्गिक रचनेला समर्पक केली आहे. हा शिल्पपट ज्या दोन मोठ्या शिलाखंडांवर शिल्पांकित केला आहे त्याच्या मध्ये एक नैसर्गिक घळ निर्माण झालेली आहे. या दोन खडकांच्या माथ्यावर एका कुंडामध्ये पाणी साठवले जाते आणि त्या कुंडातून ते पाणी या शिल्पपटातील घळीतून सतत पडत राहते अश्या प्रकारची सोय केली आहे. पावसाळ्यामध्ये माथ्यावरून सतत पडणाऱ्या पाण्याच्या रूपात साक्षात गंगाच पृथ्वीवर अवतरीत होत असल्याचा सोहळा इथे अनुभवता येतो. या खडकाच्या अरुंद घळीमध्ये नागराज आणि नागस्त्रिया यांची शिल्पे आहेत. नागराज आणि नागस्त्री यांनी त्यांचे हात जोडले आहेत. शिलाखंडावर चंद्र, सूर्य, किन्नर दम्पती, सिद्ध, गंधर्व आणि अप्सरा यांची अंकने आहेत. ज्या भगीरथाने कठोर तपश्चर्या करून गंगेला भूतलावर आणतो आहे हा क्षण या शिल्पामध्ये बघायला मिळतो. भगीरथ एका पायावर उभा राहून कठोर तपश्चर्य करीत आहे. त्याच्या शरीरावरील त्वचा तपश्चर्येने सुकून केवल हाडांचा ढाचा दिसत आहे. सर्व ग्रह, गंधर्व, सिद्ध, अप्सरा तिथे अवतरीत होत असलेल्या गंगेला बघण्यासाठी त्या घळीच्या दिशेने मार्गक्रमण करीत आहेत. भगीरथाच्या बाजूला चतुर्भुज शिव त्याच्या गणासह उभा दाखवला आहे. अनेक सिद्ध योग-पट्ट धारण करून योगिक असनामध्ये बसलेले आहेत. याशिवाय सिंह, वाघ, हत्ती, वानर, हरीण यांसारखे प्राणीही शिल्पांकित केले आहेत.
हा संपूर्ण शिल्पपट प्रत्यक्ष समोर थांबून बघताना आपल्याला देवी गंगा साक्षात स्वर्गातून पृथ्वीवर खाली उतरत आहे या भाव निर्माण होतो. या शिल्पाच्या माध्यमातून हा दिव्य सोहळा अनुभवताना आपल्या मुखातून आपसूकच शब्द निघतात हर गंगे भागीरथी.
अर्धनारी नटेश्वराची अधिक माहिती घ्यायची झाल्यास शतकानुशतके भगवान शंकराची पूजा केली जात आहे. परंतु फार कमी लोकांना माहित आहे की शंकराचे दुसरे रूप आहे अर्धनारीनटेश्वर! वास्तविक शंकराने हे रूप स्वेच्छेने घेतले. स्त्री-पुरुष समान आहेत हा संदेश त्यांना यामधून द्यायचा होता. तेव्हा सर्वप्रथम जाणून घेऊया, कोणत्या कारणास्तव भगवान शंकराला हे रूप धारण करावे लागले.
भगवान शंकराच्या अर्धनारीनटेश्वर अवतारात आपण पाहतो की त्यांचे अर्धे शरीर स्त्रीचे आहे आणि अर्धे शरीर पुरुषाचे आहे. हा अवतार स्त्री-पुरुष समानतेचा संदेश देतो. समाजात, कुटुंबात आणि जीवनात पुरुषाचं महत्त्व तितकंच आहे जेवढं स्त्रीचं आहे. त्यांचे आयुष्य एकमेकांशिवाय अपूर्ण आहे, दोघेही एकमेकांना पूर्ण करतात.
शिवपुराणानुसार, ब्रह्माजींच्या मनात अनेक प्रश्न निर्माण होऊ लागले, जेव्हा ब्रह्मांडाची वाढ होत नव्हती. तेव्हा त्यांनी मैथुनी सृष्टी निर्माण करण्याचा संकल्प केला. पण तोपर्यंत शिवापासून स्त्रियांच्या कुळाचा जन्म झाला नव्हता. तेव्हा ब्रह्मदेवाने शिवाला शक्तीने संतुष्ट करण्यासाठी तपश्चर्या केली. ब्रह्मदेवाच्या तपश्चर्येने संतुष्ट होऊन भगवान शंकर अर्धनारीनटेश्वराचे रूप धारण करून त्यांच्या जवळ गेले आणि त्यांच्या शरीरातील देवी शक्तीचे अंश वेगळे केले. त्यानंतर ब्रह्माजींनी त्यांची पूजा केली. त्याच्या भक्तीवर प्रसन्न होऊन, शक्तीने त्याच्या कपाळाच्या तेजाने आणखी एक शक्ती निर्माण केली, जी दक्षाच्या घरी मुलगी म्हणून जन्मली.
स्त्रियांना पुरुषांइतकाच मान-सन्मान आणि प्रतिष्ठा मिळावी, असा संदेश देवाने अर्धनारीनटेश्वराचे रूप घेऊन दिला आहे. त्यांच्याशी कोणत्याही प्रकारचा भेदभाव होता कामा नये.तर, अशी ही अर्धनारीनटेश्वराची कहाणी!भारतात भगवान शंकराला काही ठिकाणी अर्धनारीनटेश्वर या स्वरूपातही पुजले जाते. देशात अशी जवळपास पंधरा सोळा मंदिरे आहेत,
अर्धनारी नटेश्वराची पुराणात अशी कथा आहे, की एकदा भगवान शंकर व पार्वती बसले असताना अनेक देव व ऋषी भृगू तेथे आले. त्यांनी शिवपार्वती, दोघांना प्रदक्षिणा घातली आणि वाकून नमस्कार केला. पण भृगू यांनी पार्वतीमातेकडे दुर्लक्ष केले. तिला नमस्कार पण केला नाही. कारण ते फक्त शंकराचे भक्त होते. देवी पार्वतीला ते आवडले नाही. पार्वतीने भृगू ऋषींना शाप दिला, की भृगूच्या शरीरामधील मांस-रक्त नाहीसे होईल! लगेच तसे झाले व शरीर हाडावर फक्त कातडे घातल्यासारखे झाले. त्यांना नीट उभे राहता येईना, तेव्हा शंकरांना त्याची दया आली. शंकरांनी भृगूंना उभे राहण्यासाठी तिसरा पाय दिला. भृगू आनंदी झाले व ते आनंदाने नाचू लागले. पार्वतीला ते आवडले नाही. तेव्हा पार्वतीने तपश्चर्या करून शंकराकडून वर प्राप्त केले, की शिवपार्वती कधीही वेगवेगळे होणार नाहीत. त्यामुळे शंकरांनी अर्धनारी नटेश्वर असे स्वरूप धारण केले.
२० व्या शतकातील तामिळनाडूमधील अर्धनारीश्वराचे शिल्प
आर्ट ऑफ लिविंग आश्रमातील बेंगळुरु येथील अर्धनारीश्वर
आपल्या शरीराचा डावा भागात हृदय आहे, जे अंर्तज्ञान आणि रचनात्मक कार्यासाठी आवश्यक मानले जाते. तर शरीराचा उजवा भाग तर्क, वीरता आणि विचारपुर्वक कार्य करण्याची क्षमता असलेला आहे असे मानले जाते. शिवाचे हे रुप ब्रम्हांडातील उर्जा हे पुरुष आणि स्त्रीच्या संयोगातून येते असे मानले जाते. परिपुर्ण जीवन जगण्यासाठी पुरुष आणि स्त्रीची एकरुपता आणि समानता याचे प्रतिक म्हणजे अर्धनारी रुप. या रुपाचा अर्थ हा आहे कि स्त्री आणि पुरुष यांच्यात द्वंद नसून ते एकमेकांचे अविभ्याज अंग आहेत आणि त्यांचे मिलन परमानंद निर्माण करते. भगवान शिवांची काही रुपांची आता पुजा केली जात नाही, मात्र अर्धनारीश्वराचे रुप सर्वव्यापी आहे आणि त्याची पुर्ण भारतभरात आजही पुजा केली जाते. शिवांची इतर रुपांची आराधना विशिष्ट पंथीय किंवा संप्रदायाचे लोकच करतात, मात्र अर्धनारी रुप हे कोणत्याही एका विशिष्ट संप्रदायाशी संबधित नसल्यामुळे हे शिल्प आपल्याला अनेक मंदीरावर कोरलेले पहायला मिळते, अर्थात फक्त अर्धनारी रुपाची स्वतंत्र अशी मंदीरे खुप कमी आहेत.
पती-पत्नीमधील मत्सराशी संबंधित आणखी एक समज आहे. शिवाने देवी गंगेला आपल्या मस्तकावर धारण केले आणि देवी पार्वतीना आपल्या मांडीवर स्थान दिले. यामुळे शिव दुसऱ्या स्त्रीला जास्त महत्त्व देत असल्याचा पार्वतीला राग आला. वैवाहिक विवाद मिटवण्यासाठी आणि देवी पार्वतीला तिचे शंकंराच्या जीवनातील स्थान स्पष्ट करण्यासाठी, शिव देवी पार्वतीमध्ये अशा प्रकारे विलीन झाला की तिचा अर्धा भाग स्वतःचा झाला. प्रतिकात्मकपणे, त्याने कबूल केले की त्याचा अर्धा भाग त्याची पत्नी आहे. यासंदर्भात शिव आणि पार्वती या दोघांमधला एक रंजक संवाद पाहुया. (जो आपण सर्वजण आपल्या दैनंदिन जीवनातही पाहू शकतो).
देवी पार्वती अस्वस्थ होते आणि शिव तिला शांत करण्याचा प्रयत्न करतात.
भगवान शिव - देवी, तू का काळजी करतेस? मी काय चूक केली?
देवी पार्वती - भगवान, आपण आता माझ्यावर प्रेम करत नाहीत असे मला वाटते आहे.
भगवान शिव - हे खरे नाही. तुला असे का वाटते?
देवी पार्वती - आजकाल आपण मला आवडत असलेली फुले आणत नाहीत, यापेक्षा मोठा पुरावा काय असू शकतो ?
भगवान शिव (हसत) - अरे, फक्त इतकेच कारण आहे तर ! हे बघ, तुला माहीत आहे की नंदीची तब्येत बरी नाही आणि तुला माहीत आहे की तुझी आवडती फुले आणण्यासाठी मला त्याच्याबरोबर उंच पहाडावर जावे लागेल. जर नंदी आजारी असताना मी त्याला घेउन पहाडावर गेलो तर या अवस्थेत त्याच्यासाठी हे खूप त्रासदायक होईल.
देवी पार्वती - ठीक आहे. मला हे मान्य आहे. पण अलीकडे आपण मला आपल्याबरोबर नृत्य करायला बोलावत नाही.
भगवान शिव - देवी, तू माझी प्रिय पत्नी आहेस. नृत्य करण्यासाठी मला तुला आमंत्रित करण्याची गरज आहे का? तुला पाहिजे तेव्हा तू माझ्याबरोबर येऊ शकतोस.
देवी पार्वती - मला फसवण्याचा प्रयत्न करू नका. तुम्ही ध्यान करत असता तेव्हा तुम्ही हसत असता हे माझ्या लक्षात आले आहे. मला माहीत आहे, तुम्ही दुसऱ्या स्त्रीबद्दल विचार करत आहात आणि हसत आहात.
भगवान शिव - देवी, तू स्वत: सिद्ध योगिनी आणि आत्मज्ञानी आहेस. तुला माहिती आहे की ध्यान केल्याने माणसाच्या चेहऱ्यावर आंतरिक आनंद आणि शांती येते.
देवी पार्वती - आजकाल तुम्ही सकाळी लवकर घरातून निघता आणि रात्री उशिरा परतता.
भगवान शिव - देवी, हे तुला चांगलेच माहीत आहे. माझ्याकडे खूप गण आहेत,त्यांची मला काळजी घ्यायला हवी. तुला माझ्या जबाबदाऱ्या आणि चिंता माहित आहेत. कृपया तुझा नेमकी काय खरा मुद्दा आहे, तो कथन कर.
भगवान शिव - (या सर्व रुसव्याचे खरे कारण समजल्यामुळे ) देवी, तु गंगेची काळजी करू नका. ती माझ्या मस्तकाचा हा एक छोटासा भाग आहे. तीची आणि स्वतःशी तुलना करू नका. तू माझी पत्नी आहेस आणि तू माझी अर्धांगिनी आहेस.
आणि मग तो तिचे अर्धनारीश्वर रूप दाखवतो आणि देवी पार्वतीला खात्री देतो कि तीला वैवाहिक सुखाबद्दल तक्रार करण्याचे कारण नाही.
शिवाचे अर्धनारीश्वर रूप- ऋषी भृंगी यांना त्यांची चूक कळते
शिवाने हे रूप कसे धारण केले याबद्दल आणखी एक कथा आहे. यानुसार, एकदा देव आणि ऋषी भगवान शिव आणि देवी पार्वतीला नमस्कार करण्यासाठी कैलास पर्वतावर गेले. सर्वांनी भगवान शिव आणि देवी पार्वतीची पूजा केली, ऋषी भृंगी हे भगवान शिवाचे कट्टर आणि निस्सीम भक्त होते, त्यांनी मात्र देवी पार्वतीकडे दुर्लक्ष केले. असे मानले जाते की भृंगी ऋषींनी हे फक्त भगवान शिवानाच सर्वश्रेष्ट मानत होते. म्हणून, त्यानी पार्वतीची पूजा करण्यास नकार दिला आणि केवळ भगवान शंकराची पूजा आणि प्रदक्षिणा केली.
भृंगी ऋषि, एकंबरेश्वर मंदिर, कांचीपुरम
देवी पार्वतीला त्यांच्या वागण्याने आश्चर्य वाटले आणि रागही आला. भृंगी ऋषींना आपली चूक कळावी म्हणून पार्वतीनी त्यांचे सर्व स्त्रीरूप त्यांच्यापासून काढून घेतले. मांस आणि रक्त हे स्त्री शक्तीचे रूप आहे. यामुळे,शृंगी ऋषी केवळ सांगाड्याच्या स्वरुपात शिल्लक राहीले, अशा स्थितीत भृंगी ऋषींना उभे राहताही येत नव्हते.भगवान शिवानी आपल्या भक्ताची दयनीय अवस्था पाहिली तेव्हा त्याने त्याला एक काठी दिली, जेणेकरून तो किमान त्याच्या पायावर उभा राहू शकेल. भृंगी ऋषींना या काठीच्या साहाय्याने चालण्याची इतकी सवय झाली की तो त्यांचा तिसरा पाय दिसू लागला. तथापि, या अडथळ्याला न जुमानता त्यांनी फक्त शिवाची पूजा आणि प्रदक्षिणा सुरू ठेवली.
बदामी, कर्नाटक येथील अर्धनारीश्वर शिल्प, डाव्या बाजुला भृंगी तर उजव्या बाजुला दाखवलेली महिला भक्त हातात एक पेटी घेउन जाताना दिसत आहेत.
याची तक्रार देवी पार्वतीने भगवान शंकराकडे केली. भगवान शिवानॉ पार्वतीचे म्हणणे मान्य केले की ते दोघेही एकच आहेत, परंतु आपल्या हट्टी भक्ताला ते पटवून देऊ शकले नाहीत.शेवटी त्याने देवी पार्वतीला आपल्यामध्ये विलीन होण्यासाठी आणि अर्धनारीश्वराच्या रूपात ऋषीसमोर येण्यास सुचवले, जेणेकरून दोघांच्या एकरुपतेबद्दल कोणाच्याही मनात शंका उरणार नाही;भगवान शिव आणि पर्वती हे दोन नाहीत तर एक आहेत याची सर्व ऋषींना खात्री पटेल आणि शिव-पार्वतीपैकी कोणीही श्रेष्ठ किंवा कनिष्ठ नाही हा संदेश सर्वत्र पसरेल.
पुढच्या वेळी जेव्हा भृंगी ऋषी भगवान शिवाची पूजा करण्यासाठी आले तेव्हा शिव अर्धनारीश्वराच्या रूपात प्रकट झाले. तथापि, भृंगी ऋषी केवळ शिवाची उपासना करण्याबाबत इतके ठाम होते की त्यांनी स्वत: ला सुपारीमध्ये रूपांतरित केले आणि शिवाच्या अर्धनारीश्वर रूपाच्या मध्यभागी छिद्र पाडण्यास सुरुवात केली जेणेकरून ते केवळ शिवाच्या त्या भागाभोवती फिरू शकतील. त्यांची अलोट भक्ती आणि त्यासाठी काहीही करायची तयारी बघूनआश्चर्यचकित आणि प्रसन्न होऊन देवी पार्वतीने त्यांचा कट्टरपणा स्वीकारला आणि त्यांना आशीर्वादही दिला.अर्धनारीश्वर रूप हे शिवाचे पत्नीसोबत एकरुप होण्याच्या इच्छेचा परिणाम आहे.
दुसऱ्या मान्यतेनुसार, शिवाचे अर्धनारीश्वर रूप हे आपल्या जोडीदाराबरोबर सर्व काही सामायिक करण्याच्या इच्छेचा परिणाम आहे.त्याने केलेल्या प्रत्येक गोष्टीचा, अगदी त्याचे शरीर आणि तो अनुभवत असलेल्या प्रत्येक गोष्टीचा तिने एक भाग असावा अशी त्यांची इच्छा होती. म्हणून त्यांनी आपल्या अर्ध्या शरीराचा त्याग केला आणि देवी पार्वतीला स्वतःमध्ये विलीन होण्याची विनंती केली, परिणामी अर्धनारीश्वर रूपाचा जन्म झाला.
महाभारतात उपमन्यूचे असे मत दाखवले कि भगवान शिव हेच सर्वोच्च असून शिव हे एकटेच असे आहेत जे आपल्या शरीराचा अर्धा भाग आपल्या पत्नीसोबत विभागून घेतात. नयनार संतांनी त्यांच्या स्तोत्रात भगवान शिवांची स्तुती केली आहे. संत सुंदरर म्हणतात की, हे रूप शिव आणि माता पार्वतीदेवीची अविभाज्यता दर्शवते. संत संबंधर म्हणातात की, शिव या रूपात संदेश देतात कि ते म्हणजे स्त्री ही केवळ त्यांची पत्नी नसून त्यांचा एक शाश्वत भाग आहे. कवी कालिदास यांनी त्यांच्या काव्यात उपमा देताना लिहीले आहे की, हे रूप धारण करून भगवान शिव हा संदेश देऊ इच्छितात की ते आणि देवी पार्वती हे शब्द आणि त्याचा अर्थ किंवा अक्षर आणि उच्चार यांसारखे अविभाज्य आहेत. नवव्या शतकातील संत माणिककावचकर म्हणतात की हे रूप दर्शवते की देवी पार्वती ही भगवान शिवाची निस्सीम भक्त आहे आणि देवी पार्वतीच्या रूपात भगवान शिवाशी एकरूप होणे हेच भक्ताचे अंतिम ध्येय आहे.आचार्य रजनीश यांनी या रुपाला वैश्विक महत्त्व असलेले एक रहस्य मानले आहे कारण हे रुप पुरुषत्व आणि स्त्रीत्व या दोन परस्परविरोधी प्रतिकांच्या मिलनाचे प्रतिनिधित्व करते.एलिफेंटा लेण्यातील अर्धनारीश्वर के रूपातील शिव मुर्ती
अर्धनारीश्वर स्वरूपाचा वरचा भाग :-
या स्वरुपात मूर्तीचा शिव भाग सामान्यतः जटा असलेल्या केसांसह अर्धचंद्र कोरलेला असतो, तर देवी पार्वती भाग सामान्यतः फुल माळलेल्या केसांसह कोरलेला असतो. शिव भाग नख-कुंडल, सर्प-कुंडल किंवा साधे कुंडल परिधान केलेला दाखवला असतो तर देवी पार्वती पत्र-कुंडल, नख-कुंडल किंवा वालिका-कुंडल परिधान केलेले दाखवले असते. शिवाच्या कपाळावर तिसरा डोळा असतो आणि त्याच्या डाव्या बाजूला म्हणजे पार्वतीच्या बाजुला तिसऱ्या डोळ्याच्या रेषेत बिंदू दाखवला असतो.
अर्धनारीश्वर स्वरूपाचा मध्य भाग :-
मध्यभागी, शिव रुपाला सपाट मर्दानी छाती, रुंद खांदे, रुंद कंबर आणि पुष्ट स्नायूं असलेल्या मांड्या दाखवल्या असतत. शिवाच्या गळ्याला सहसा यज्ञोपवीता असते. काही शिल्पांमध्ये हा धागा नाग-यज्ञोपविता (सापाचा धागा) किंवा मोती आणि रत्नांच्या माळा म्हणून दर्शविला असतो.या यज्ञोपविता, बहुतेक शिल्पाचे दोन भागांमध्ये विभाजन होते, शिव बाजू आणि पार्वती बाजू.
उत्तर भारतातील चिन्हांमध्ये, पुरुषाची बाजू नग्न दर्शविली जाते, पूर्ण किंवा अर्धे लिंग आणि अंडकोष दाखवलेला असतो. तर दक्षिण भारतातील प्रतिमांमध्ये, शिवाने रेशीम किंवा सुती धोतर किंवा वाघाचे कातडे घातलेले, कंबरेपासून फक्त गुडघ्यापर्यंत शरीर झाकलेले आणि सर्प-मेखला, नागाच्या कमरपट्टा धारण केलेले दाखवले असते.बहुतेकदा पाउल वाकलेले आणि कमलासनात असते.त्रिभंग मुद्रेतील, तीन भुजा असलेली अर्धनारीश्वर शिव , तंजावरर, तमिलनाडु
तर, देवी पार्वतीच्या बाजुला गोलाकार छाती दाखवली असते.तीने हातात निळे कमळ धारण केलेले असते जे गळ्याजवळ असते.तीचे हात बांगड्या आणि इतर दागिन्यांनी सुशोभित केलेले तसेच सिंहकटीवर मेखला दिसतो. तिला भरीव मांड्या, सुडौल शरीर आणि नितंब दाखवले आहे. धड, नितंब आणि पायाचा भाग हे पुरुष आणि मादी शरीरातील फरक दर्शवण्यासाठी उत्तमरित्या कोरलेले असतात.
अर्धनारीश्वर स्वरूपाचा खालचा भाग :-
पार्वतीने घोट्यापर्यंत लांबीचे रेशमी वस्त्र परिधान केलेले दाखवले असते आणि तीचे पाय मेंदीने लाल रंगवलेले असतात. ती हिमालयाची कन्या असल्याचे दर्शविणारा पोपट हिरव्या रंगवलेला असतो किंवा तिला गौरी म्हणून दर्शविण्यासाठी शिवाच्या पुरुष बाजूपेक्षा अधिक गोरी दाखवलेली असते.या शिल्पात इतके बारकावे दाखवलेले असतात कि मुर्तीचे उजव्या बाजुला भगवान शिवाचे भेदक दृष्टी तर मुर्तीच्या डाव्या बाजूला पार्वतीचे शांत आणि सौम्य करुणामय डोळे दाखवलेले असतात.
या मूर्ती सामान्यतः शरीर वळवलेल्या स्थितीत दाखवलेल्याअसतात, बहुतेक अर्धनारी शिल्पे उभ्या म्हणजे स्थानक स्वरुपात असतात, परंतु काही मुर्ती बसलेल्या स्थितीतील म्हणजे आसन मूर्ती देखील आढळतात.
जर या मुर्ती त्रिंभग अवस्थेतील असतील तर त्या शरीराच्या दोन जागी म्हणजे मान व कंबर इथे वळवलेल्या असतात. काही मुर्ती अभंग स्वरुपात असते (यामध्ये मूर्ती किंचित पुढे किंवा मागे वाकलेली दर्शविली जाते) तसेच या मुर्ती स्तंभन मुद्रेतही (उभ्या मुद्रा) दिसतात. जर मुर्ती आसन स्थितीत असेल तर सहसा कमळाच्या पीठावर बसलेली दर्शविली जाते. बहुतेक वेळा नंदी हे देवतेचे वाहन म्हणून कोरले जाते, जरी शिवाच्या बाजूला नंदी आणि देवी पार्वतीच्या बाजूला सिंह असलेली शिल्पे देखील आहेत.
अर्धनारीश्वर शिवाची त्रिभंग मुद्रेतील स्थानक मुर्ती
अर्धनारीश्वर स्वरूपातील शिव दोन, तीन, चार आणि आठ हातांचे दाखवलेले असतात. दोन हात असलेली शिल्प हे सर्वात जुने स्वरूप आहे. या स्वरुपामध्ये सामान्यतः अभय मुद्रा (हात बोटे सरळ असून या मुद्राद्वारे व्यक्त केलेली कल्पना अशी आहे की देवता तुम्हाला सर्व वाईटांपासून वाचवते ) , वरदा मुद्रा ( यामध्ये हा उजवा तळहात सामान्यत: खालच्या बाजुला वळवलेला असतो. इथे कल्पना अशी आहे की देव त्याच्या भक्तांना वरदान देतो).
तर पार्वतीच्या बाजुला, तीचा हातात नीळे कमळ किंवा आरसा असतो, तसेच हा हात कटक मुद्रेत (ज्याला सिंहकर्ण मुद्रा देखील म्हणतात, या मुद्रामध्ये बोटांची अग्रे किंवा टोक एकत्र जोडून अंगठीसारखा आकार बनतो. या आकारात पुजा करताना दररोज एक फूल अर्पण केले जाते)
अनेक शिल्पांमध्ये देवी पार्वतीला वीणा वाजवताना दाखवलेली आहे, अर्थात वीणा वाजवण्यासाठी दोन्ही हात लागतात, ( एक हात शिवाचा तर एक पार्वतीचा ) म्हणून ते दैवी समरसतेचे प्रतीक मानले आहे. देवीचा पुढील हात बांगड्यांनी सजवलेला आहे.
दोन भुजा असलेली अर्धनारीश्वराची मूर्ति, पट्टदकल, कर्नाटक
त्रिभुज स्वरूपात शिवाच्या बाजुला दोन हात कोरलेले आहेत. पार्वतीच्या बाजूच्या एकाच हातात कमळ, आरसा किंवा पोपट दाखवलेला असतो. शिवाचे अलौकिकत्व दोन हातांनी दाखवले असते तर पार्वतीला मानव स्वरुपात एकाच हाताने दाखवले असते.

त्रिभुज अर्धनारीश्वर, गंगाईकोंडाचोलापुरम, तामिळनाडू
विष्णु-धर्मोत्तर पुराणात चार हात असलेल्या मूर्तींचे शाब्दिक वर्णन आहे. यानुसार, मुर्तीचे हात सामान्यतः कोपरमध्ये दुमडलेला असतो. शिवाच्या बाजुचा हात सामान्यतः अभय-मुद्रामध्ये कोरलेला असतो आणि दुसऱ्या हातात परशु किंवा त्रिशूळ किंवा जपमाळ असते, एक हात किंचित वाकलेला असतो आणि नंदीच्या डोक्यावर असतो आणि दुसऱ्या हात अभय मुद्रेत असू शकतो. तर पार्वतीच्या बाजूचा एक हात कटक-मुद्रामध्ये कोरलेला असतो, जो बौद्धिक क्षमतेचे संकेत देतो. किंवा त्या हातात कमंडलु, आरसा, कमळ, वीणा, डमरू किंवा पोपट धारण केलेले देखील दाखवलेले असू शकते.
मामल्लापुरम, तमिलनाडुमधील अर्धनारीश्वर शिवाची चार भुजा असलेले रूप
तमिलनाडुमधील दारासुरम मधील आठ भुजांची, तीन शीर असलेली अर्धनारीश्वर शिव
श्री मुरली नटराजन यांच्या एका पोस्टवरून कळलं की ही मूर्ती खरं तर सदाशिवमूर्ती आणि भगवान शिवाच्या अर्धनारीश्वर रूपाचं मिश्रण आहे.
अर्धनारीश्वर (राजापुर, जि. हिंगोली)
औंढा नागनाथ जवळ राजापुर येथे तीन मुर्ती आहेत. यात सरस्वती आणि योग नरसिंह यांच्या मुर्ती आहेत. तिसरी अप्रतिम मुर्ती आहे अर्धनारीश्वराची. शिव पार्वतीची संयुक्त मुर्ती. उजव्या बाजुला शिव आहे आणि डावीकडे पार्वती. पत्नी ही नेहमी डाव्या बाजूला दाखवली जाते म्हणूनच वामांगी असा शब्द आला आहे.या शिल्पकाराचे कसब अगदी एक एक जागी आढळते. पार्वतीचा मुकुट सजलेला (करंडमुकुट) आणि शिवाचा मुकुट जटांचा. तिच्या कानात सुंदर नाजूक कुंडले तर शिवाच्या कानात सर्पाकार कुंडले. पार्वतीला हातभर काकणं, तोडे. बाजुबंद, खालच्या हातात नाजुकपणे धरलेला कमंडलू. कमरेला मेखला. कमाल म्हणजे तिच्या वस्त्रांवरची नक्षीही दाखवलेली आहे. पायात तोडे तर आहेतच पण अंगठ्या जवळच्या बोटात जोडवे पण आहेत. वरच्या हातात आरसा आहे.
शिवाच्या वरच्या हातात त्रिशुळ आहे. खालच्या हातात अक्षयमाळा आहे. बाजुबंद सर्पाकार राकट आहे. पायात रूंडमाळा दिसतात, पण हीच माळ पार्वतीच्या बाजूने नाजूक दागिना बनते. गळ्यातील माळेचेही असेच. शिवाच्या बाजूने सरळ ठाशीव दिसणारी माळ पार्वतीच्या स्तनांवरून वळण घेत कलात्मक डौलदार बनते. तिचे वार्यावर उडणारे वस्त्र आणि शिवाचे जाडे भरडे वस्त्र.
खाली शिवाचे वाहन नंदी आहे आणि पार्वतीचे सिंह न दाखवता लोध (मुंगुस किंवा घोरपड) दाखवले आहे.
महाराष्ट्रात अर्धनारीश्वराच्या मुर्ती फार थोड्या आहेत. ज्या आहेत त्या मंदिराच्या बाह्य भागावर कोरलेल्या आढळून येतात. मुख्य मुर्ती म्हणून कोरलेवी हाच एकमेव अप्रतिम नमुना.
अर्धनारीश्वराच्या मांडीवर गणेश मुर्ती :-
कल्याणसुंदर :-
शिव आणि पार्वती या दैवी जोडप्याचा विवाहप्रसंग ‘कल्याणसुंदर’ या नावाने शिल्पांकित केला गेला आहे. विवाहप्रसंगाची लगबग, पाहुण्यांची गर्दी, सलज्ज वधूवर आणि विधींचे तपशील या सर्व घटकांची रेलचेल दर्शविणारे कल्याणसुंदर शिल्पपट भारतात सर्वत्र आढळून येतात. कल्याण म्हणजे लग्न. शंकर पार्वतीच्या लग्नाचे अत्यंत मनोहारी शिल्पांकन अनेक मंदिरात दिसते. या शिल्पामध्ये साधारणतः शंकराने पार्वतीय पाणिग्रहण केलेले दाखवते त्यामध्ये खाली होम पेटलेला असतो आणि ब्रह्मदेव पौरोहित्य करताना दिसतो. याशिवाय पार्वतीच्यामागे तिचे वडील हिमवान, तिची आई मेना आणि शिवाचे गण, दासदासी वगैरे ही दाखवलेले असतात. दशावतार लेणीतील (वेरुळ लेणी क्र. १५) एका शिल्पात पार्वतीने आपले दोनही शंकराच्या हातात दिलेले दिसतात. कैलास मंदिरातील पूर्व भिंतीवर मात्र या मालिकेतील सर्वात सुंदर शिल्प कोरलेले आहे. या शिल्पामध्ये पार्वतीने आपल्या उजव्या हाताने शंकराचा हात पकडलेला असे अजब शिल्पांकन आहे. ही कलाकाराची चूक नसून त्याची असामान्य प्रतिभा इथे प्रगटलेली दिसते. या शिल्पात वधू पार्वती लज्जेने मान झुकविलेली (अधोवदना) व नजर खाली वळविलेली (सलज्जा) आणि डावा पाय किंचित वाकवून (सविनया) अशी उभी आहे. पण गंमत पहा तिने शंकराचा हात हाती घेतला आहे. कलाकाराची चूक तर नव्हे ? नाही, अहो हेच व्हावे म्हणून पार्वतीनेच तर तप केले होते. हे जमविण्यातला तिने घेतलेला पुढाकार यात दर्शविलेला आहे. पण हे धारिष्ट्य सर्वांसमोर करावे लागले त्यामुळे ती संकोचली आहे. ज्यामुळे तिच्या डाव्या पायाच्या अंगठ्याने उजव्या पायाचा अंगठा घासते आहे. निर्जीव पाषाणात साकार केलेला हा जिवंत देखावा खरोखरच पाहण्यासारखा आहे. शंकराचाही उजवा गुडघा किंचित वाकलेला आहे. साहजिकच आहे. मी मी म्हणणाऱ्या नवरदेवांप्रमाणे साक्षात महादेवाचीही बोहल्यावर चढल्यावर अशीच गत झाली असेल नाही का?शिवपार्वती विवाह, कैलास मंदिर, वेरूळ

कल्याणसुंदर मूर्ती, रतनपुरा (जि. बिलासपूर, छत्तीसगढ).
दक्ष प्रजापतीने एक यज्ञ केला आणि त्यासाठी सर्व देवदेवतांना निमंत्रण दिले. मात्र स्वतःची मुलगी सती आणि जावई शिव यांना कटाक्षाने वगळले. पित्याच्या या कृतीमुळे अपमानित झालेल्या सतीने त्याच यज्ञकुंडात स्वतःची आहुती देऊन प्राणत्याग केला. पुढे तिने हिमालयाच्या पोटी पार्वती म्हणून जन्म घेतला. याही जन्मात शिवच आपल्याला पती म्हणून लाभावा यासाठी तिने घनघोर तप सुरू केले. त्यावेळी शंकरही तपश्चर्येत मग्न होते. इकडे, तारकासुर नावाचा दैत्य देवादिकांना त्रास देत होता. विधिलिखिताप्रमाणे त्याचे पारिपत्य शंकराच्या पुत्राच्या हातून व्हावयाचे होते. त्यासाठी शंकराने लवकर विवाह करावा म्हणून देवांनी मदनाला त्याची तपश्चर्या भंग करण्यास पाठवले. हे लक्षात आल्यावर क्रोधित झालेल्या शिवशंकरांनी आपला तिसरा डोळा उघडून मदनाला भस्म केले. मात्र नंतर सर्व देवतांच्या इच्छेचा मान राखून त्यांनी पार्वतीशी विवाह केला. या कथेवर आधारित दोन प्रकारच्या प्रतिमा अस्तित्वात आल्या; पहिली कामांतक/मदनांतक शिव आणि दुसरी कल्याणसुंदर.
कल्याणसुंदर प्रतिमा सहसा इ. स. सातव्या शतकानंतर विकसित झालेल्या आढळून येतात. त्यांपैकी सर्वांत भव्य आणि कलात्मक आविष्कार म्हणून मुंबई येथील घारापुरी (एलिफंटा) बेटावरील लेण्यातील प्रतिमेकडे बोट दाखवता येईल. यात शिव आणि पार्वती मध्यवर्ती ठिकाणी उभे असून पार्वती शिवाच्या उजव्या बाजूस आहे. चतुर्भुज शिवाचा पुढचा उजवा हात पार्वतीच्या उजव्या हातात आहे. पार्वतीची देहयष्टी अतिशय आकर्षक असून तिची अधोवदन मुद्रा सलज्ज आहे. तिच्या एका बाजूस पिता हिमालय व दुसऱ्या बाजूस लक्ष्मी आणि तिच्या मागे हाती उदकपात्र घेऊन विष्णू उपस्थित आहेत. ब्रह्मा होमाशेजारी बसून पौरोहित्य करत आहे. या मंगलप्रसंगासाठी अंतराळात अष्टदिक्पाल व इतर देवदेवतांनी गर्दी केलेली दिसते. वेरूळच्या धुमार लेण्यातील (लेणे क्र. २९) शिल्पपटाशी घारापुरी येथील शिल्पाचे लक्षणीय साम्य आहे, मात्र कलादृष्ट्या घारापुरीचे शिल्प अधिक उजवे आहे.

कल्याणसुंदर शिव, वेरूळ लेणे क्र. २९, (जि. छत्रपती संभाजीनगर, महाराष्ट्र).
वेरूळच्या रामेश्वर लेण्यात (लेणे क्र. २१)
या व्यतिरिक्त रतनपुरा (जि. बिलासपूर, छत्तीसगढ), गया (बिहार), औंढा नागनाथ (जि. हिंगोली, महाराष्ट्र), सुंदरेश्वर मंदिर (मदुरा, तमिळनाडू) येथे काही उल्लेखनीय कल्याणसुंदर प्रतिमा आढळतात.
कैलास लेणं हे केवळ अप्रतिम शिल्पसौंदर्याने नटलेले आहे, वास्तुशास्त्राचा अद्वितिय नमुना आहे इतकंच नव्हे. तर या लेण्यात संस्कृतीक चालीरिती कोरलेल्या आहेत हे लक्षात घेतले पाहिजे. अगदी आजही सनातन पद्धतीने जो विविहसोहळा पार पडतो त्यात "पाणिग्रहण" असा विधी आहे. तेराशे चौदाशे वर्षांपूर्वी कोरलेल्या या लेण्यांत हाच विधी अशाच पद्धतीने शिल्पांकित केला आहे.
हा प्रसंग शिव पार्वती विवाह सोहळ्याचा आहे. शिवाचा डावा हात पार्वतीच्या उजव्या खांद्यावर आहे. उजवा हात हातात घेतला आहे. पार्वती सलज्ज अशी जराशी मान खाली झुकवून उभी आहे. दोघेही ललित मुद्रते सहजतेने उभे आहेत. सुख दू:खात हीला सोबत घेवून धर्म अर्थ काम मोक्ष हे चारी पुरूषार्थ मी प्राप्त करेन, हीला सुखात ठेवेन, ही माझी सहधर्मचारीणी आहे अशा आशयाचे हे संस्कृत मंत्र आहेत. हे आजही उच्चारले जातात. शिव पार्वती जसे उभे आहेत अगदी तसेच आजही जोडप्याला उभे केले जाते. पत्नी ही नेहमी डाव्या बाजूला दाखवली जाते. म्हणूनच तीला "वामांगी" असा शब्द आहे. उजव्या बाजूला आई, बहिण, मुलगी, सुन अथवा पुरूषाची शक्ती दर्शविलेली असते.खाली ब्रह्मदेवाची मूर्ती आहे. जे की या विवाह सोहळ्याचे पौराहित्य करत होते. कैलास लेणे या दृष्टीनेही पहायला पाहिजे.
गौरीहर किंवा हरगौरी प्रतिमा :-
उमा-महेश्वर प्रकारातील आणखी एक वैविध्य म्हणजे गौरीहर किंवा हरगौरी प्रतिमा. यात शिवाजवळ त्याचे वाहन नंदी आणि पार्वतीजवळ तिचे वाहन गोधा (घोरपड) दाखवतात. या गोधेबद्दल ‘गोधसना भवेद गोधा’ अर्थात गोधेवर आसनस्थ झालेली ती गौरी, असे म्हटले आहे. गौरीहर मूर्तीचे एक उत्तम उदाहरण म्हणजे निलंगा (जि. लातूर, महाराष्ट्र) येथील निळकंठेश्वर त्रिदल मंदिरात असलेली प्रतिमा. यात हर आणि गौरी वज्रपीठावर एकत्र बसलेले असून वर मकरतोरण आहे. हराच्या मागच्या दोन्ही हातांत त्रिशूळ, नाग असून पुढील उजव्या हातात अक्षमाला आहे व डावा हात पार्वतीच्या खांद्यावर आहे. गौरीनेही आपल्या उजव्या हाताने हरास आलिंगन दिलेले असून तिच्या डाव्या हातात बीजफल धारण केले आहे. शिवाजवळ शिवगण, मोरावर बसलेला कार्तिकेय आणि नंदी, तर गौरीच्या जवळ गणेश आणि तिचे वाहन गोधा आहेत. अशा प्रकारच्या मूर्ती राहेर (जि. नांदेड), वेळापूर (जि. सोलापूर), राजापूर (जि. हिंगोली), तसेच बदामी (जि. विजापूर) कर्नाटक येथे आढळतात.देवीदेखील अशा प्रकारच्या प्रतिमेत त्याच आसनावर शिवासह स्थानापन्न झालेली असेल, तर ती उमासहितमूर्ती होय. देवी सहसा शिवाच्या डाव्या बाजूस असते. द्विभुज अशा पार्वतीने उजव्या हाती कमळ धारण केलेले असते; डावा हात सिंहकर्णमुद्रेत किंवा पीठावर सहजपणे ठेवलेला असतो. तिच्या मस्तकावर करंडमुकुट व अंगावर इतर आभूषणे असतात. अशा प्रकारे एकाच प्रभामंडळाखाली एकत्र बसलेली शिव-पार्वतीची मूर्ती ही ‘उमासहितमूर्ती’ म्हणून ओळखली जाते.

सोमास्कंद मूर्तीदेखील अशाच प्रकारची शिव-पार्वतीची एकत्रित प्रतिमा असून त्यात व उमासहितमूर्तीत मुख्य फरक म्हणजे शिव आणि उमेच्या मध्ये बाळ कार्तिकेय दाखवितात. (स उमा स्कंद) पार्वती आणि स्कंद - कार्तिकेय यांच्यासह असणारे हे शिल्प असते. या शिल्पामध्ये शंकर आणि पार्वती यांच्या बरोबरच छोटासा (बाल) स्कंदही असतो. तो उभा, दोघांमध्ये पीठावर बसलेला किंवा उमेच्या मांडीवर बसलेला असतो. कधीकधी तो नृत्य करतानाही दाखवतात. अशावेळी कार्तिकेयाला एकच मुख, दोन डोळे व दोन बाहू दाखवतात. त्याने करंडमुकुट, नक्रकुंडले व इतर आभूषणे धारण केलेली असतात. उभ्या स्कंदाच्या उजव्या हातात कमळ व डावा हात सैल सोडलेला असतो.सहसा सोमास्कंद प्रकारची उभी मूर्ती आढळत नाही. महाबलिपुरम् येथील धर्मराजरथाच्या शिल्पात एक उत्तम सोमास्कंदमूर्ती आहे. येथे शिव-पार्वती दोघेही वामललितासनात बसलेले असून बाळ स्कंद पार्वतीच्या मांडीवर आहे. शिवाचा वरचा उजवा हात व खालच्या हाताचा पंजा नाहीसा झालेला असून वरचा डावा हात खांद्यास स्पर्श करीत आहे, तर खालचा, ध्यानमुद्रेत आहे. पार्वतीने उजव्या हाताने स्कंदास धरले असून डावा हात आसनावर ठेवलेला आहे. शिवाच्या मागे उजवीकडे ब्रह्मदेव आणि डावीकडे विष्णू आहेत. हात लांबवलेली व पाय किंचित उचललेली बाळ कार्तिकेयाची मूर्ती अत्यंत नैसर्गिक वाटते. वेरूळ येथील कैलास लेण्यात नंदीवर बसलेल्या सोमास्कंदाची मूर्ती आहे. शिव चतुर्भुज असून त्याच्या शेजारी पार्वती व तिच्या मांडीवर कार्तिकेय आहे.
शिवाच्या सोमस्कंदमार्ति पैलूबद्दल अनेक व्याख्या केल्या गेल्या आहेत. शिव आणि उमा यांच्यातील बालक मुरुकनचे शिल्प दाखवणे हे प्रामुख्याने कौटुंबिक जीवनात मुलाचे महत्त्व पटवून देण्यासाठी केले जाते. पुरनरू आणि तिरुक्कूरा सारख्या तमिळ काव्ये देखील आनंदी आणि सुसंवादी समाजासाठी मुलांच्या महत्त्वावर भर देतात. संस्कृत ग्रंथ अवंती सुंदरी कथा देखील या मताचे समर्थन करते. पल्लव राजाच्या राणीने, मंडपातील सोमस्कंदाचे चित्र पाहून, तिला चित्रात दर्शविलेल्या स्कंदासारखे सुंदर मूल मिळावे म्हणून देवाकडे प्रार्थना केली.
दुसरे मत असे आहे की या तीन मुर्ती सत्, चित् आणि आनंद दर्शवतात. याशिवाय असे मानले जाते की शिव, उमा आणि स्कंद अनुक्रमे इच्छा-शक्ती, क्रिया-शक्ती आणि जनक-शक्ती यांचे प्रतिनिधित्व करतात (वैत्यलिंगम १९८०-९० ). पुन्हा उमा आणि स्कंद यांच्या सहवासात शिव हे वैश्विक पितृत्वाचे प्रतीक आहे (नागस्वामी, १९८३). कालिदासाने जगाचे पिता आणि माता (जगत पित्रौ) म्हणून या जोडप्याचे कौतुक केले आहे. कालिदासाने कुमारच्या जन्मावर कुमारसंभवम् हे अमर महाकाव्य लिहीले. कुमारकुरुपार यांनी त्यांच्या पिरापंतथिरट्टूमध्ये तीन मुर्तींची तुलना अनुक्रमे सत्त्व, तमसा आणि रजस या तीन गुणांशी केली आहे. शेवटी, सोमस्कंदमार्ति हे शिव आणि उमा यांचे एकत्रित रूप असलेल्या स्कंदाच्या उपासनेवर भर देते.
सोमास्कंद मुर्तीचे शास्त्र :-
उमा-महेश्वरमूर्तीबद्दल विष्णूधर्मोत्तर पुराण आणि रूपमंडन सविस्तर माहिती देतात. विष्णूधर्मोत्तर पुराणाच्या मते, शिव व उमा हे आलिंगनावस्थेत एका पीठावर बसलेले असावेत. शिव द्विभुज असून त्याच्या उजव्या हातात निलोत्पल (निळे कमळ) व डावा हात उमेच्या खांद्यावर असावा. डोक्यावर जटामुकुट व चंद्रकोर असावी. उमेचाही हात शिवाच्या अंगाभोवती असून डाव्या हातात आरसा धरलेला असावा. रूपमंडन ग्रंथाच्या मते, शिवप्रतिमा चतुर्भुज असावी; तिच्या वरच्या उजव्या हातात त्रिशूळ, खालच्या हातात म्हाळुंग (एक फळ), एका डाव्या हातात नाग व दुसरा पार्वतीच्या खांद्यावर असावा. ऐहोळे (कर्नाटक) येथील उत्तर चालुक्यकालीन शिल्पात शिव सव्यललितासनात बसलेला असून उजव्या हातात नाग आणि त्रिशूळ आहेत. खालच्या डाव्या हाताने पार्वतीस आलिंगन दिले आहे. पार्वतीचा उजवा हात शिवाच्या व डावा स्वतःच्या मांडीवर ठेवला आहे. सभोवार नंदी, भृंगी व इतर शिवगण आहेत.
वेरुळमध्ये हे शिल्प कैलास मंदिराच्या गर्भगृहाबाहेरील उजवीकडच्या भिंतीवर आहे. यातील पार्वतीचे डोके मात्र आता नाही. शिवाच्या मांडीवर बाल स्कंद असून तो आपल्या आईकडे बघतो आहे, परंतु त्याचा उजवा हात उचललेला असून त्याची मूठ वळलेली आहे. तो आपल्या छोट्या तर्जनीने शिवाकडे बोट दाखवून आपले बाबा हे किती मोठे आहेत हे अभिमानाने सांगतो आहे.
उत्तर भारतातील शिव-पार्वतीच्या आसनमूर्तींत उमा-महेश्वरमूर्ती लोकप्रिय आहेत. दक्षिणेतही सुखासनमूर्ती, उमासहितमूर्ती, उमा-महेश्वर, सोमास्कंद या सर्व महत्त्वाच्या मानल्या जातात. मत्स्यपुराण, अपराजितपृच्छा या ग्रंथांत त्यांचे वर्णन आढळते. शिल्परत्नात सुखासनमूर्तीचे वर्णन पुढीलप्रमाणे केले आहे, ‘ही चतुर्भुज मूर्ती बैठ्या अवस्थेत असून अतिशय देखणी, रजोगुणयुक्त असावी. पोवळ्या लाल रंगाची ही मूर्ती भद्रपीठावर डावा पाय दुमडलेल्या व उजवा पाय खाली लोंबकळत असलेल्या अवस्थेत असावी. तिने व्याघ्रचर्म तसेच रेशमी वस्त्रे परिधान केलेली असावीत. मागच्या उजव्या व डाव्या हातात अनुक्रमे परशु व मृग असावेत, तर पुढचा उजवा हात अभयमुद्रेत आणि डावा हात वरद किंवा सिंहकर्णमुद्रेत असावा. जटामुकुट, यज्ञोपवीत, सर्पकंकणादी आभूषणे असावीत.ʼ अशा वर्णनात बसणाऱ्या शिवप्रतिमेला सुखासनमूर्ती म्हणतात.


![]() |
वैट्टुकुवरण येथील १२ व्या शतकातील शेवटच्या पंचवीस वर्षात कोरलेली स़्कंदाची मुर्तीत चतुर मुद्रेत नाचत आहे,याचा उजवा पाय किंचित वर आणि डावा हात नृत्यशैलीत वळवला आहे. उजव्या हातात एक फूल आहे. केसांची रचना आकर्षक आहे.
अनुग्रह शिव मुर्ती :
अनुग्रहमूर्ती म्हणजे शंकराच्या वरप्रदानास अथवा अनुग्रहास प्राप्त झालेल्या व्यक्तिची कथा.एक शिवरूप. शिव ही संहारदेवता असली तरीही वेळप्रसंगी तो आपल्या भक्तांवर प्रसन्न होऊन त्यांच्यावरील संकटांचे निवारण करणारा म्हणून अनुग्रह अर्थात कृपा करणाऱ्या शिवाची अनेक रूपे प्रसिद्ध आहेत. त्यांसंबंधी अनेक कथा लोकमानसात प्रचलित आहेत. त्यांपैकी काही महत्त्वाच्या अनुग्रहमूर्ती म्हणजे अर्जुनानुग्रह, चंडेशानुग्रह, रावणानुग्रह, विष्णवनुग्रह, नंदेशानुग्रह, मार्कंडेयानुग्रह या होत. मात्र अनुग्रहमूर्ती या संहारमूर्तींइतक्या प्रसिद्ध नाहीत.
शिवाच्या अनुग्रह मूर्तीमध्ये रावणानुग्रह, चंडेशानुग्रह, विष्णवानुग्रह असे विविध प्रकार आढळतात. यातील रावणानुग्रह मूर्ती हे अत्यंत लोकप्रिय शिल्प आहे. वेरुळ मध्ये रामेश्वर लेणे (क्र.२१), रावण की खाई (क्र. १४), दशावतार लेणे (क्र.१५) कैलास आणि लंकेश्वर (क्र.१६) आणि धुमार लेणे (क्र.२९) इथे हे शिल्प पाहावयास मिळते. याशिवाय घारापुरी, विरूपाक्ष मंदिर (पट्टदकल), परशुरामेश्वर मंदीर (ओडिशा), बृहिदश्वर मंदिर (तंजावर), आँढा नागनाथ या ठिकाणी हे शिल्प दिसते. एवढेच नाही तर कंबोडियातील मंदिरांमधेही याचे अत्यंत कल्पक शिल्पांकन आढळते. याशिवाय गंगाई कोंडचोलापुरम् (तामिळनाडू) येथे चंडेशानुग्रह यांचे सुंदर शिल्प आहे. कैलास मंदिराच्या दक्षिण भिंतीवर कोरलेले शिल्प हे या सर्वांमधील सर्वात भव्य आणि सर्वात श्रेष्ठ शिल्प आहे.
रावणानुग्रहशिवमूर्ती
रावणानुग्रहाच्या दोन प्रकारच्या मूर्ती दिसतात १) यामध्ये आपली दहा डोकी कापून शंकराल अर्पण करणाऱ्या रावणाचे एक शिल्प असते. याशिवाय २) शिव पार्वती ज्यावर विराजमान आहेत तर कैलास पर्वताला रावण उखडून टाकण्याचा प्रयत्न करीत असल्याचे शिल्प असते.
रावणानुग्रह क्र. १ :-
वेरुळमधील कैलास मंदिराभोवतालच्या उत्तरेकडील व्हरांड्यातील पहिले शिल्प रावणानुग्रहाचे आहे. एका पिंडीभोवती ९ मानवी शिरे कोरलेली दिसतात. रावणाने श्रीशंकराला अर्पण केलेली स्वतःची ९ मस्तके (नवविधा भक्तीची प्रतीके) आहेत. दहावे मस्तकही तो कापत असल्याचे थरारक दृश्य आहे. याची कथा अशी की रावण रोज सकाळी तलावातून कमळ तोडायचा. स्नान करून शंकराची पूजा करायचा. एकदा शंकराच्या मनात विचार आला की रावणाची भक्ती आपण तपासून पाहावी. शंकराने त्याच्या ताटातील फुले काढून घेतली. स्नान करून रावण आला. पाहतो तर काय ? तेथे कमळे नाहीत. आता फुले आणायला माघारी वळला तर संकल्प मोडतो आणि तसाच पूजेला देवळात देला तर देवाच्या पूजेसाठी रिकाम्या हाताने जावे लागणार. रावण काय ते समजला. क्षणाचाही विचार न करता तो तलवार घेऊन तरातरा तसाच पिंडीसमोर गेला आणि म्हणाला, देवा, परीक्षाच घ्यायची होती तर इतकी साधी कशाला ? दहा शिरकमले जी तू मला दिली आहेस, त्याचा उपयोग कधी होणार? असे म्हणून त्याने एका मागून एक आपली डोकी कापायला सुरुवात केली आणि पिंडीला तो अर्पू लागला. दहावे डोकेही कापण्याच्या तो तयारीत होता. शिल्पामध्ये एका हाताने कपाळ घट्ट धरलेले दिसते ते त्राग्याने नव्हे तर कापण्यासाठी, ते घट्ट धरून त्याचा निश्चय व्यक्त करण्यासाठी. समर्पित भक्तीची ही परिसीमाच नव्हे काय? ही भक्ती पाहून भगवान शंकर प्रसन्न झाले आणि त्याला अनुग्रह दिला. देऊळ पाहायला सुरुवात केल्यावर विथिकेमध्ये अगदी प्रथमच हे शिल्प हेतूपुरस्सर कोरले आहे. इतकी अविचल निष्ठा आणि भक्ती आपल्या मनात असेल तर पायऱ्या चढून गेल्यावर त्या परब्रह्माचे दर्शन होऊ शकते, हा संकेत येणाऱ्या सर्व भक्तांसाठी सूचकतेने दिलेला आहे. कोणतेही मोठे काम करायचे असल्यास प्रसंगी शीर कापून द्यायची सुद्धा तयारी असेल तरच ते काम पूर्णत्वाला जाण्याची शक्यता असते असा संदेश या शिल्पातून देण्याचा प्रयत्न दिसतो. (देगलूरकर : २००८, पृ.५१)
अर्थात यातील गंमत म्हणजे ही कथा आहे मूळची ब्रह्मदेवासंदर्भात. वाल्मिकी रामायणाप्रमाणे रावण हा ब्रह्मदेवाला मस्तके अर्पण करून वरप्राप्ती करून घेतो. तर येथे मात्र शिवाची कथा कोरलेली आहे. एकंदरीतच वैदिक देवता विस्मृतीत जात असताना शैव, वैष्णव पंथांचे प्राबल्य कसे वाढायला लागले होते याचा हा एकप्रकारे पुरावाच.
मूळ वाल्मिकीरामायणातील श्लोक पहा.
दशवर्षसहस्रं तु निराहारो दशाननः ।
पूर्णे वर्षसहस्रे तु शिरश्चाग्नौ जुहाव सः ||
एवं वर्षसहस्राणि नव तस्यातिचक्रमुः ।
शिरांसि नव चाप्यस्य प्रविष्टानि हुताशनम् ॥
अथ वर्षसहस्रे तु दशमे दशमं शिरः ।
छेत्तुकामे दशग्रीवे प्राप्तस्तत्र पितामहः ॥
पितामहस्तु सुप्रीतः सार्धं देवैरुपस्थितः ।
तव तावद् दशग्रीव प्रीतोऽस्मीत्यभ्यभाषत ॥
शीघ्रं वरय धर्मज्ञ वरो यस्तेऽभिकाङ्क्षितः ।
कं ते कामं करोम्यद्य न वृथा ते परिश्रमः ॥
कथेचा थोडक्यात आशय वर दिलाच असल्याने आता याचे परत भाषांतर करीत नाही.
रावणानुग्रह क्र. २ :-

कैलाश पर्वताला हलवणारा रावणचा शिल्पपट, कैलास पर्वत विवीध थरात दाखविला असऊन त्यावर ऋषि आणि शिव गणो दाखवले आहेत. सर्वात खालच्या स्तरात भयभीत पशु इकडेतिकडे पळताना दाखवले आहेत, तर त्याचवेळी भगवान शिव शांत मुद्रेत देवी पार्वतील धीर देताना दाखवले आहेत.
कैलाश पर्वतावर शिव-पार्वती समीप बसलेले असताना, रावण कैलास पर्वताला हलवत आहे; बांतेय सराय, कंबोडिया येथील रावणानुग्रह मूर्ति ,
दशग्रीवाचे नाव रावण पडले :-
या सर्व घडामोडीमागील व्यक्तीला भगवान शिव चांगल्या प्रकारे ओळखत होते. त्यानी देवी पार्वतीला आपल्या मिठीत घेतले आणि आपल्या घाबरलेल्या पत्नीला सर्व काही नियंत्रण करण्याचे आश्वासन दिले. त्यानंतर त्यानी पर्वत स्थिर होण्यासाठी आणि दशग्रीवाला धडा शिकवण्यासाठी पायाचे बोट खाली दाबले. भगवान शंकराच्या पायाच्या बोटाच्या दाबामुळे कैलास पर्वताचे वजन खूप वाढले. दशग्रीव आता ते सांभाळू शकत नव्हते.आणि दशग्रीवाचे हात त्याखाली अडकले. तो खूप जोरात ओरडला. त्याच्या मोठ्या किंकाळ्याने तिन्ही ब्रह्मांड - स्वर्ग, पृथ्वी आणि पाताळ हादरले.
रावण अनुग्रह - रावणाने आपले एक डोके आणि एक हात कापला आणि भगवान शिवांना समर्पित केला ज्याला रावणहथ म्हणतात, सोमेश्वर महादेव मंदिर, उलसूर, बंगलोर
रावण आणि रुद्रवीणा :-
ऋषी आणि त्यांच्या मंत्र्यांनी दशग्रीवाला भगवान शिवाकडून क्षमा मागून स्वतःचे रक्षण करण्याचा सल्ला दिला.दशग्रीवाने कश्याबश्या वेदना सहन करत स्वत:ला नियंत्रित केले आणि भगवान शिवाची कृपा होण्यासाठी प्रार्थना करण्यास सुरुवात केली. त्याने आपले एक डोके आणि एक हात कापला आणि आपल्या नसा, शिरा आणि आतडे वापरून एक वाद्य बनवले आणि नटराजाच्या (भगवान शिव) स्तुतीसाठी शिव तांडव स्तोत्र म्हणू लागला. हे वाद्य दुसरे, तिसरे काही नसून रुद्र वीणा होती. दशग्रीव रुद्रवीणा वाजवणारा एक महानतम वादक होता.
रावणानुग्रह - भगवान शिवाची कृपा
भगवान शिवाने दशग्रीवाला हजार वर्षे पर्वताखाली गाडून ठेवले.आता मात्र रावणाचा अहंकार गळाला आणि त्याने शंकरांची प्रार्थना करायला सुरुवात केली. अखेरीस भगवान शिव रावणाच्या प्रार्थना आणि स्तुती गाण्यामुळे शांत झाले. त्याला जाणवले की दशग्रीवाला आपली चूक कळाली आहे. भगवान शिव त्याच्यासमोर प्रकट झाले आणि त्याचे नाव रावण ठेवले - म्हणजे एक भयंकर किंचाळणारा - कारण त्याच्या मोठ्या किंकाळ्याने तिन्ही जग हादरले होते. त्यांनी त्याला आशीर्वाद दिला आणि त्याला चंद्रहास - म्हणजे एक अजिंक्य तलवार आणि पूजा करण्यासाठी एक शक्तिशाली आत्मलिंग दिले. शंकरांनी त्याला मुक्त करून लंकेस जायची परवानगी दिली.
दुसन्या एका कथेमध्ये रावणाने शंकराला लकेत चलण्याचे आवाहन केले. तेव्हा आपण सोडून जाऊ शकत नसल्याचे शिवाने त्याला सांगितले. त्यावर उपाय म्हणून रावणाने कैलासासह शिवपार्वतीला लकेत न्यायचे ठरविले. म्हणून कैलास पर्वत उचकटण्याचा प्रयत्न त्याने केला.शंकराने कैलास हलल्यास ब्रह्मांडाचे संतुलन बिघडेल म्हणून आपल्या उजव्या पायाचा अंगठा दाबून स्थिर केले. तसेच रावणाचेही दमन केले. रावणाची ही भक्ती पाहून शिवाने त्याला चंद्रहास तलवार दिली. या कथेवर आधारित शिल्प वेरुळमध्ये अनेक ठिकाणी कोरलेले दिसते.
तर तिसऱ्या कथेमध्ये शंकर पार्वती यांच्यामध्ये काही कारणाने विसंवाद निर्माण झाला त्यामुळे शिवाच्या द्वारपालाने रावणाला कैलासावर जाण्यापासून अडवले. या कथेवर आधारित संबध भारतातील हे एकमेव शिल्प असावे. (अपवाद लंकेश्वर लेण्यामध्ये याचा एक प्रयत्न झालेला दिसतो. )
वेरूळ लेणी क्र २९ मधील रावणानुग्रहशिवमूर्ती
वेरूळ लेणी क्र. २१ (रामेश्वर) येथील रावणानुग्रहशिवमूर्ती. लक्ष्यपूर्वक पाहिल्यास रावणाचे दहावे मुख हे गर्दभाचे असल्याचे दिसेल.
गोंदेश्वर मंदिर, सिन्नर येथील बाह्यभिंतीवर कोरलेली रावणानुग्रहशिवमूर्ती
वेरुळ येथील कैलास मंदिराच्या दक्षिणेकडील भिंतीवर सर्वात विलक्षण, कल्पक, परिपूर्ण तोलनाचे शिल्प आहे. त्याची कथा अशी, रावण कुबेराचा पराभव करून आकाशमार्गे परतताना चाटेवर कैलास पर्वत दिसला. तो पाहण्याच्या इच्छेने तो पर्वतावर उतरला. उतरताक्षणी श्रीशंकराच द्वारपालांनी त्याला रोखले. उन्मत रावणाचा अहंकार जागृत झाला व मस्तीने तो म्हणाला, 'ज्या ठिकाणी मला मुक्त प्रवेश नाही, ती जागाच लंकेत घेऊन जातो. मग बघतो मला शंकराचे दर्शन घेण्यापासून कोण प्रतिबंध करतो ते." रागाच्या भरात तीरासारखा तो कैलास पर्वताच्या खाली गेला, वीरासनावर बसून आपल्या वीसही हातांनी कैलास पर्वत गदागदा हलवून उखडून काढला. कैलासाला भूकंपासारखे हादरे बसू लागले. त्या वेळी कैलासावर काय स्थिती होती बरे? शिव पार्वती असले तरी ते शेवटी नवराबायको. काही भांडण झाल्याने पार्वती तोंड फिरवून कृतक्कोपाने महादेवापासून दूर बसली होती. दासी तिची समजूत घालत होती. अचानक बसणाऱ्या हादऱ्यांनी दासी भयकंपित होत स्वतःचा जीव वाचविण्यासाठी पळू लागली व पार्वती राग विसरून भयभीत होऊन शंकराला बिलगते. शिल्पकाराने खोदलेल्या बारकाव्यांमुळे हे शिल्प जिवंत झाल्यासारखे वाटते. पळणाऱ्या दासीला अंशात कोरलेले आहे, तिचा अंबाडा अर्धवट सुटलेल्या अवस्थेत आहे. त्यामुळे तिचा वेग नजरेला जाणवतो. या गतीने पळताना समोर पाहून पळणे स्वाभाविक असते. पण या दासीचा नेत्रकटाक्षा मागे आहे, नवरा बायकोचे भांडण आता तरी मिटले की नाही हे पाहण्याच्या स्त्रीसुलभ उत्सुकने ! पार्वतीने भयकंपित होऊन शिवाचा दंड धरला आहे. तो तिने प्रेमाने घरलेला नसून भीतीने पकडला असल्यामुळे तिची बोटे विलग झाली आहेत. अत्यंत रेखीवपणे कोरलेले हे शिल्प तो क्षण आजही जणू जिवंत करते, कैलासाला बसलेल्या हादऱ्यांनी आजूबाजूच्या निसर्गावर आणि मनुष्यमात्रांवर झालेला परिणाम तितक्याच उठावदारपणे कोरलेला आहे. झाडावरची माकडे भयभीत झालेली आहेत.शिवगण रावणावर दगडांचा वर्षाव करत आहेत तर वादन करणारे कलाकार आपली वाद्ये खांद्यावर पळायच्या तयारीत आहेत, हिमालयात तप करणारे ऋषी महादेवाकडे अपेक्षेने पाहत आहेत, देवा देवा आता कसे होणार ? पण हा सर्व कोलाहल श्रीशंकर शांतपणे न्याहाळत आहे. जणू त्याला विचारायचे आहे, अरे मी असताना तुम्हा सर्वांना इतके धाबरण्याचे कारण काय? तेही या यत्किचित रावणाला ? शिवाने आपल्या उजव्या पायाच्या अंगठ्याने किंचित दाब द्यायला सुरुवात केली. या किंचित दाबानेही रावणाच्या अंगावर प्रचंड दबाव येऊ लागला. त्याचा एकेक हात श्रमाने थकून खाली पडू लागला, एक चेहरा रडू लागला, एक चेहरा मर्कटासारखा वेडावाकडा झाला. त्याच्या लक्षात आले की कैलास उपटणे सोपे पण तो हलवणे अशक्य कारण ही झुंज तर प्रत्यक्ष महादेवाशी आहे. येथे आपली डाळ शिजणार नाही. अशा प्रसंगी शिवाची स्तुती केली तरच आपली सुटका होईल हे रावणाच्या लक्षात आले. त्याने आपल्या बुद्धिचातुर्याने एक स्तोत्र रचले. याला रावणविरचित शिवतांडवस्तोत्र असे म्हणतात. ते त्याने मोठमोठ्याने म्हणायला सुरुवात केली.
"जटाटवीगलज्जलप्रवाहपावितस्थले गलेवलम्ब्य लब्मितां भुजंगतुंगमालिकाम् ।
डमड्डमड्डमड्मन्निनादवड्डमर्वयं चकार चण्डताण्डवं तनोतु नः शिवः शिवम् ।।"
अशा प्रकारच्या पंधरा श्लोकांचे हे स्तोत्र ऐकून प्रसन्न झालेल्या भोळ्या शंकराने त्याला क्षमा केली. अचाट शक्तिशाली माणसाचा अहंकार नाहीसा करण्यासाठी परमेश्वराच्या यत्किंचित अंगठा टेकवण्याएवढी शक्ती पुरेशी असते. या शिल्पातून बोध घ्यायचा आहे तो असा की जीवनात भूकंपासारखे प्रसंग येतात. प्रत्यक्ष भूमी हादरून किंवा कुटुंबात भूकंपसदृश घटना घडल्यानेसुद्धा अशा प्रसंगी प्रज्ञावान मंडळींनी ठामपणे उभे राहून धैर्याने त्याचा सामना केला पाहिजे. हीच गोष्ट भगवंताने गीतेत सांगितली आहे.
दुःखेष्वनुद्विग्नमनाः सुखेषु विगतस्पृहः ।
वीतरागभयक्रोधः स्थितधीर्मुनिरुच्यते ।। भ. गीता २-५६ ।।
वेरूळच्या कैलास लेण्यात पाच तोंडे आणि वीस हातांचा रावण वीरासनात शिल्पांकित केला आहे. त्याचे सर्वांत वरचे दोन हात कैलास पर्वत उचलत आहेत. वर शिवपार्वती त्यांच्या गणांसह दिसतात. दोन्ही कोपऱ्यांत अनेक ऋषीमुनी रावणाचे गर्वहरण पाहण्यास एकत्र आले आहेत. शिवाचा शांत भाव आणि उन्मत्त रावणाची हिंसक मुद्रा यांतील फरक येथे प्रकर्षाने जाणवतो. कर्नाटकमधील बेलूर येथील चन्नकेशव मंदिरावरील शिल्प १२ व्या शतकातील आहे. त्यात मध्यभागी एका चौकोनी मंडपात शिवपार्वती असून पर्वताखाली गुडघ्यांवर बसलेला आणि पर्वत हलवण्याचा प्रयत्न करणारा रावण आहे. त्याच्या हातात तलवारही आहे. या शिल्पात अनेक देवदेवता, विविध पशुपक्षी, इतर बारीकसारीक तपशील विलक्षण कौशल्याने दाखवले आहेत.
रावणानुग्रह मूर्ती (औंढा, हळेबीडू)
डावीकडील शिल्प औंढ्याच्या नागनाथ मंदिरावरील आहे. या शिल्पाला "रावणानुग्रह" असे नाव डाॅ. देगलुरकरांच्या पुस्तकात आढळते. कैलास पर्वतावर शिव पार्वती बसलेले आहेत. शिवाच्या उजव्या वरच्या हातात त्रिशुळ आहे. डावा हात पार्वतीच्या कमरेवर आहे. पार्वतीचा उजवा हात शिवाच्या उजव्या खांद्यावर आहे. हा पर्वत रावणाने उचलून धरला आहे. रावण वज्रासनात बसलेला आहे. शिव सव्यललितासनात बसलेला आहे (उजवा पाय खाली सोडलेला, डाव्याची मांडी). पार्वती वामललितासनात (डावा पाय मोकळा, उजव्या पायाची मांडी) असून शिवाच्या मांडीवर बसलेली आहे.
असेच शिल्प वेरूळला कैलास लेण्यात आणि "सीता की नहानी" नावाने ओळखल्या जाणार्या २९ क्रमांकाच्या लेण्यातही आहे.
उजवीकडचे शिल्प हळेबीडूच्या होयसळेश्वर मंदिरावरचे आहे. इथे रावणाचे पाच तोंडं दिसत आहेत. शिव पार्वती ज्या कैलास पर्वतावर बसलेले आहेत त्या पर्वताचे बारकावे तिथले प्राणी पक्षी पशु यांच्यासह दाखवले आहेत. हे थक्क करणारे आहेत. एक बाय दोन फुटाच्या या छोट्या दगडी तूकड्यात इतके बारकावे कोरणे म्हणजे किती कौशल्याचे काम.
पर्वताच्या टोकावर बसलेले शिव पार्वती जे या चराचराचे सर्वेसर्वा आहेत. त्यांच्या उच्चासनावरून हे सहज सुचित होते. या मूर्तीचा अर्थ अभ्यासक वेगवेगळा लावतात. पण हळेबीडूच्या मूर्तीतून शिव पार्वती सोबतच प्रकृती आणि पुरूष असे म्हणता येईल. शिवाय रावणाने कितीही हलविण्याचा प्रयत्न केला तरी प्रकृती आणि पुरूष यांच्या मुळे हे चराचर व्यवस्थित चालू आहे असाही अर्थ लावता येतो. रावणाला पर्वत ओलांडायचा होता. पण शिव पार्वती त्यावर विलास करत होते. त्यामुळे कुणालाच तिथून जायची परवानगी नव्हती. रावणाला आपल्या शक्तीवर गर्व होता. त्याने पर्वतच हलवायला सुरवात केली. मग शिवाने त्याला जखडून ठेवले. मग रावणाने शिवाची तपस्या केली व अनुग्रह मागितला. अशी काहीशी पुराणकथा सांगितली जाते.
रावणनुग्रह रुपाचे मुर्ती शास्त्र :-
आगम किंवा शिल्पशास्त्रात ही मूर्ती कोरण्यासाठी कोणतेही विहित स्वरूप नाही. बहुतेक रावणनुग्रह मूर्तींमध्ये भगवान शिव आणि देवी पार्वती मूर्तीच्या वरच्या भागात कैलास पर्वतावर बसलेल्या दर्शवतात. खालच्या भागात रावण कैलास पर्वत उचलण्याचा प्रयत्न करत असल्याचे दाखवले जाते. कैलास पर्वत हा त्रिकोणी स्वरुपात किंवा समभुज चौकोनी आकाराचा दाखवला असतो, तर काही वेळा अनेक थर असलेल्या व्यासपीठासारखा दाखवला असतो.

रावणनुग्रह शिल्पपट, वेरुळ , महाराष्ट्र
कैलास पर्वताच्या हादरण्याने अनेक देव, देवी, ऋषी आणि प्राणी घाबरलेले दाखवले जातात. देवी पार्वती देखील अचानक घडलेल्या घटनेने अस्वस्थ, नकळत आणि घाबरलेली दिसते. ती वाकून भगवान शिवाला आलिंगन देत असलेली दाखवली जाते. या सर्व कोरीव कामांमध्ये, भगवान शिव देवी पार्वतीच्या कोमल मिठीचा आनंद घेत शांत मुद्रेत कोरलेले असतात.कैलास पर्वताला स्थिर करण्यासाठी त्यानी पायाचे बोट दाबून धरलेले दाखवले जाते.

रावणानुग्रह शिल्पपट , बंटेय सेराई, कंबोडिया
रावण गुडघ्यावर बसून सर्व शक्तीनिशी पर्वत उखडून टाकण्याचा प्रयत्न करत असल्याचे दाखवले असते. तो शक्तिशाली राक्षस म्हणून दाखवण्यासाठी त्याच्या शरीर मजबूत स्नायूंचे आणि डोके वाकलेले दर्शविले जातो. तसेच शिवाच्या पायाचे बोट दाबण्यामुळे त्याचा प्रभाव म्हणून रावणाच्या चेहऱ्यावरील वेदना दिसून येतात. थकलेल्या अंगांनी आणि अवघडलेल्या शरीराने तो कासावीस झालेला दिसतो.
रावणानुग्रह प्रसंगाचे महत्व :-
भगवान शिवांच्या चरित्रातील हा प्रसंग त्यांची शक्ती आणि क्षमाशीलतेचे उदाहरण आहे. या कथेचा प्रसार होण्याचे कारण म्हणजे शैव आणि वैष्णव पंथीयांचा संघर्ष. जर विष्णूचा अवतार असलेल्या रामाने रावणाचा वध केला आणि भगवान विष्णूंचे श्रेष्ठ्त्व सिद्ध झाले म्हणून भगवान शिवांचे महत्व कायम रहावे यासाठी शिवांनी रावणाचा अत्यंत सहज पराभव केला हे ठळकपणे दिसावे यासाठी हि कथा महत्वाची ठरते. मुळात रामायणात रावणाचा पराभव श्रीरामाने केला, त्यामागे रावणाला शिव गणांनी दिलेला शापही कारणीभुत ठरला. यातून हा धडा घ्यायचा आहे कि एखाद्या व्यक्तीने मी कितीही बलवान आहे याचा गर्व केला तरीही त्याची गाठ त्याच्यापेक्षा ताकदवान वीराशी पडतेच.
रावणाला दशग्रीव हे नाव मिळाण्यामागे त्याला असलेली दहा तोंडे हेच कारण होते.अर्थात रावणाला दहा तोंडे का होती, याच्यामागेही काही कारण होते. लहानपणी रावणाला एकच मुख होते, मात्र तो धारण करत असलेल्या रत्नांच्या माळेत दहा मणी होते, ज्यामध्ये त्याच्या एका चेहर्याचे प्रतिबिंब उमटून दहा शिर असल्याचा आभास होत होता. रावण त्या काळातील अत्यंत बुध्दीमान आणि विद्वान व्यक्ती होता. त्याला असलेली दहा तोंडे चार वेद आणि सहा शास्त्र यांची प्रतिक होती.
१) सांख्य शास्त्र ( गणित )
२) योग शास्त्र ( योग आणि ध्यान )
३) न्याय शास्त्र ( विधी आणि प्रशासन )
४) वैशेषिक शास्त्र ( भौतिकी, खगोल विज्ञान , अभियांत्रिकी )
५) पुर्वमिंमासा ( दर्शन, औचित्य )
६) उत्तर मीमांसा शास्त्र
७) ऋग्वेद
८) यजुर्वेद
९) सामवेद
१०) अथर्ववेद
मुलतः रावण चौसष्ट कला आणि सर्व शास्त्रात निपुण होता.
पण त्याच बरोबर या दहा मस्तकांना नकारात्मक गोष्टींशीही जोडले जाते.
१) काम ( वासना )
२) क्रोध
३) मोह ( भ्रम )
४) लोभ ( लालचीपणा )
५) मद
६) मत्सर
७ ) बुध्दी
८) मनस ( मन )
९) चित्त ( इच्छा )
१०) अहंकार
मार्कडेयानुग्रह :-
आपल्या निस्सीम भक्ताची यमाच्या तावडीतून सुटका करणाऱ्या शिवाचे दर्शन मार्कंडेयानुग्रह प्रतिमेतून घडते. मर्कड ऋर्षीना अनेक अपत्ये झाली. पण ती जगली नाहीत. ऋषींनी मग मृत्यूलाच साकडे घातले. यम प्रसन्न झाला आणि म्हणाला, मी तुम्हाला पुत्र देईन परंतु तो एक तर दीर्घजीवी आणि मतिमंद असेल किंवा अत्यंत हुशार परंतु अल्पजीवी असेल. मातापित्यांनी अल्पजीवी पण हुशार मुलगा होऊ दे असा वर मागितला. मुलगा झाल्यावर त्याचे नाव त्यांनी माकैडेय ठेवले. ही मार्कंडेय जन्माची कथा आहे. मार्कंड ऋषींना शिवाच्या कृपेने एक मनासारखा मुलगा झाला. तो कुशाग्र बुद्धीचा व सर्वज्ञानी होता, पण तो केवळ १६ वर्षेच जगेल हे विधिलिखित होते. हा मुलगा जसजसा मोठा होऊ लागला तसा तो हुशार असल्यामुळे शिवाची भक्ती करू लागला. हा मार्कंडेय मोठा शिवभक्त होता. त्याला आपल्या मृत्यूबद्दल समजले तेव्हा तो तीर्थयात्रेला निघाला. प्रवास करत तो तमिळनाडूमध्ये तिरुक्कदवूर या ठिकाणी आला, तेथे तो शिव-आराधनेत अगदी तल्लीन होऊन गेला. योगायोगाने त्याच दिवशी मार्कंडेयाच्या वयाची १६ वर्षे पूर्ण होत होती. त्याप्रमाणे यम त्याचे प्राण नेण्यास आले.मार्कंडेयानुग्रह, कैलास मंदिर, वेरूळ
चंडेशानुग्रह :-
चंडेशानुग्रह प्रकारच्या प्रतिमा दक्षिण भारतात आढळून येतात. तमिळनाडूमधील ६३ नायनमार किंवा नयनार या शैव संतांची माहिती असणारे पेरीय पुराण १२व्या शतकात लिहिले गेले. यामध्ये चंडेश्वराची कथा येते. तमिळनाडूमध्ये मन्नी नदीकाठी सेयनालुर या गावात विचार सर्मण हा शिवभक्त राहत असे.तो गायी चरायला नेई आणि तिथेच वाळूचे शिवलिंग तयार करून त्याची पूजा करत असे. या गावातील लोक गायींना नीट वागवत नाहीत हे पाहून त्याने स्वतः गायींची काळजी घ्यायचे ठरविले. त्याने या गायी काही दुष्ट प्रवृत्तीच्या गुराख्यांच्या तावडीतून सोडवल्या होत्या. यावर प्रसन्न होऊन गायी त्याला भरपूर दूध देत. हे सर्व दूध तो शिवाच्या वाळूच्या केलेल्या शिवलिंगावर रोज वाहून टाकायचा. हे सर्व पाहणाऱ्या त्या दुष्ट गुराख्यांनी त्याच्या वडिलांकडे तक्रार केली. हे त्याच्या वडीलांना कळले. त्यांनी रानात जाऊन पाहिले तर हा शिवपूजेत मग्न होऊन वाळूच्या पिंडीवर दुधाचा अभिषेक करत होता. क्रोधाने त्यांनी त्याला काठीने मारायला सुरुवात केली. त्यांनी संतापून त्या शिवलिंगाला लाथ मारली. शिवलिंग मोडले. आपल्या भक्तीत व्यत्यय आणणाऱ्याकडे न पाहताच विचार सर्मणाने ती काठी हिसकावली आणि मारणाऱ्याच्या माध्य आपल्याच वडीलांच्या दिशेने भिरकावली. शिवकृपेने त्या काठीची कुऱ्हाड झाली आणि त्यामुळे त्याच्या वडीलांचा मृत्यू झाला. तरीही हा पूजेतच मग्न होता. त्याची ही निस्सिम भक्ती पाहून शिव झाले आणि पार्वतीसह ते प्रकट झाले. त्यांनी आपल्या भक्ताला आलिंगन दिले. त्यामुळे सर्मण सारुप्य मुक्ती मिळाली. शिव त्याला म्हणाले की, 'आता मीच तुझा पिता. तू चंडिकेश्वराच्या धामीड तिथे तुला माझ्याप्रमाणेच पूजतील'. यानंतर आपल्या गळ्यातील माळ स्वहस्ते चंडेशाच्या डोक्या फेट्यासारखी बांधली. आणि शिवपार्वती अंतर्धान पावले. विचार सर्मण चंडेश झाला. अशा निम्तो शिवभक्ताच्या हाताने मृत्यू आल्यामुळे त्याच्या वडीलांनाही मुक्ती मिळली आणि पितृहत्येचे चंडेशला लागले नाही. (शिवानंद : १९९९, पृ. २८). गंगाईकोंडचोलापुरम येथील मंदिरात या प्रमाण उत्कृष्ट शिल्पांकन केलेले आहे.विष्णवानुग्रह किंवा चक्रदानमूर्ती :
अर्जुनानुग्रह किंवा किरातार्जुनमूर्ती:-
अर्जुनाने शिवाकडून पाशुपतास्त्र कसे प्राप्त केले याची कथा ‘महाभारता’तील वनपर्वात येते. पांडवांच्या वनवासात धर्मराजाने अर्जुनाला इंद्राकडून दिव्यशक्ती प्राप्त करून घ्यायला सांगितले.अर्जुन इंद्राला भेटला तेव्हा इंद्राने त्याला सर्व सामर्थ्यशाली शिवाकडून पाशुपतास्त्र घेण्यास सांगितले. अर्जुन हिमालयात गेला आणि त्याने घोर तपश्चर्या आरंभ केली. ती पाहून हिमालयातील ऋषींनी शंकरांना सांगितले की तो एवढी तपश्चर्या करतो आहे, तर त्याची इच्छा पूर्ण करावी. शंकराने अर्जुनाची परीक्षा घ्यायची ठरवले. किरात वेष धारण करून शंकर अर्जुनाच्या जवळ पोचला. तेव्हा त्याला दिसले की, मूक नावाचा एक राक्षस वराहचे रूप घेऊन अर्जुनावर हल्ला करायच्या तयारीत आहे. म्हणून त्याने आपले धनुष्य काढले. तोपर्यंत अर्जुनानेही आपले धनुष्य सज्ज केले. शंकर म्हणाला की मी त्या वराहला आधी पाहिले म्हणून मी त्याला मारणार. अर्जुनाने किराताच्या बोलण्याचा अनादर करून वराहावर बाण सोडला. तिकडून शंकरानेही एक बाण सोडला. दोघांच्या बाणाने वराहरूपी मूकराक्षस याने आपले भयंकर रूप प्रकट केले आणि मरून पडला. वराहला कोणी मारले यावरून या दोघात वाद सुरू झाला. दोघांनीही एकमेकांवर बाणांचा वर्षाव केला. आपल्या बाणांनी किरातला काही होत नाही हे पाहून अर्जुन त्याच्या अंगावर धावून गेला. मग त्यांच्यात द्वंद्वयुद्ध झाले, मग मुष्ठीयुद्ध झाले. द्वंद्वयुद्धात अर्जुन पराभूत झाला; पण शेवटी त्याने किराताचे खरे रूप ओळखले आणि त्याचे पाय धरले. शिवालाही अर्जुनाच्या शौर्याची आणि तो संहारक अस्त्र धारण करण्यास सक्षम आहे याची कल्पना आली. मग शिवशंकराने आपला कृपाप्रसाद म्हणून अर्जुनाला आपले पाशुपतास्त्र दिले आणि त्याने आपले खरे रूप प्रकट केले व त्याला पाशुपतास्त्र दिले. (महाभारत, आरण्यपर्व, किरातपर्व, अ. ३८-४०), ही कथा भारवीच्या ‘किरातार्जुनीय’ व अनंतभट्टाच्या ‘भारतचंपू’ या ग्रंथांतही येते.
मूर्तिकला व चित्रकलेत हा विषय लोकप्रिय आहे, मात्र या प्रकारच्या प्रतिमेचे वर्णन केवळ ‘श्रीतत्त्वनिधी’ या एकाच ग्रंथात सापडते. त्यातील वर्णनानुसार शिव हा चतुर्भुज, त्रिनेत्र व लाल रंगाचा असावा, त्याने जटामुकुट, यज्ञोपवीत व इतर आभूषणे ल्यालेली असावीत. तो समभंग स्थितीत उभा असून वरच्या दोन हातांत परशू व मृग, तर खालच्या हातात धनुष्यबाण असावेत. त्याच्या डाव्या बाजूस पार्वती आणि जवळच अर्जुन दाखवावेत; पैकी आभूषणे ल्यालेला अर्जुन हा हात जोडून उभा असावा, असे सांगितले आहे.
किरातार्जुनमूर्ती या इ. स. सहाव्या शतकापासून पाहायला मिळतात. त्यांपैकी बहुतेक प्रतिमा दक्षिणेकडील मंदिरांमध्ये आढळतात. बदामी चालुक्यकालीन पापनाथ मल्लिकार्जुन आणि विरुपाक्ष मंदिरातील प्रतिमा ही सर्वांत प्राचीन समजली जाते. वेरूळच्या कैलास लेण्यात मुख्य मंदिराकडे जाणाऱ्या पायऱ्यांच्या उत्तरेकडील भिंतीवर ‘महाभारता’तील अनेक प्रसंग चित्रित केले आहेत. त्यांत वरच्या पट्टिकेत एक किरातार्जुनाचे शिल्प आहे. कथेतील सर्व घटनाक्रम येथे पाहायला मिळतो. प्रथम तपश्चर्या करणारा अर्जुन दिसतो. एका पायावर उभा राहून त्याने आपले हात आकाशाच्या दिशेने उंचावले आहेत. त्यापुढे शिकारीचे दृश्य आहे; एका बाजूस अर्जुन तर दुसरीकडे किरात दिसतो. त्यापुढे प्रत्यक्ष शिकार, मग त्या दोघांचे द्वंद्व. पुढील दृश्यात शिवाची ओळख पटल्यावर अर्जुन साष्टांग नमस्कार करताना दिसतो आणि शिव त्याला पाशुपतास्त्र बहाल करतात. येथे शिव चतुर्भुज असून त्यांनी त्रिशूळ, धनुष्यबाण धारण केले आहेत.
किरातार्जुन (राजा रविवर्माकृत एक चित्र).
श्रीशैल्य येथे एका शिल्पपटात शिव अर्जुनाला बाणाच्या रूपात पाशुपतास्त्र देत आहेत, असे दृश्य कोरले आहे. चतुर्भुज शिवाच्या वरच्या हातात परशू व त्रिशूळ आहेत, तर खालचा डावा हात कमरेवर आहे. उजव्या हाताने ते अर्जुनाला बाण देत आहेत. समोर उभ्या अर्जुनाने उजवा हात अस्त्र घेण्यासाठी पुढे केला आहे, त्याच्या डाव्या हातात धनुष्य आहे. पार्वती शिवाच्या उजव्या बाजूस उभी असून तिच्या हातात कमळ आहे.
अर्जुनानुग्रह, महाबलीपुरम, तमिळनाडू :-
वेरुळमधल्या महाभारताच्या शिल्पपटाची सुरुवातच या कथेने होते. त्यात सुरुवातीला वराहाभोवती दोन धनुर्धर दाखवले आहेत. नंतर त्यांच्यामध्ये झालेले मुष्टी युद्ध आणि द्वंद्र आणि त्यापुढे आसनस्थ शिव त्यांच्या पुढे गुडघे टेकून शंकराच्या पाया पडणारा अर्जुन दिसतो. महाबलिपुरम येथे अर्जुनाच्य तपश्चर्येचे हे शिल्प पंधरा फूट उंच आणि चाळीस फूट रुंद अशा विराट कातळावर कोरलेले आहे. शिल्पात दोन्ही हात डोक्यावर धरून डाव्या पायावर उभे राहून उजव्या पायाचा तळवा डाव्या गुढगा टेकून उभ्या असलेल्या तप करणाऱ्या अर्जुनाचे शिल्प असून त्याच्या शेजारी चार हातांचा त्रिशुलधारी शिव उभा असल्याचे शिल्प आहे. अर्जुनाने केवळ वायू भक्षण करून हात वर करून स्थिर स्थितीत तप केले म्हणून या शिल्पात वृक्षासनामध्ये उभा असलेला अर्जुन दिसतो. या कातळावर असंख्य शिल्प असून अर्जुनानुग्रहाचा हा सर्वात मोठा शिल्पपट आहे.
मानवस्वरूप नंदी (सपत्नीक), संस्कृत विश्वविद्यालय संग्रह.
नंदेशानुग्रह/अधिकारनंदिन् :
‘शिवमहापुराणा’तील कथेनुसार नंदी हा सालंकायण ऋषींचा पुत्र होय. बरीच वर्षे पुत्रप्राप्ती होत नसल्यामुळे त्यांनी सालग्राम या ठिकाणी साल वृक्षाखाली तप केले. त्यामुळे विष्णू प्रसन्न झाले आणि त्यांनी सालंकायण ऋषींना वर मागण्यास सांगितले. ऋषींनी आपल्याला सद्गुणी पुत्र मिळावा अशी विनंती केली. त्याबरोबर विष्णूच्या उजव्या कुशीतून एक पुरुष बाहेर आला, तो हुबेहूब शिवासारखा दिसत होता. त्याचे नाव नंदिकेश्वर असे ठेवण्यात आले. ‘लिंगपुराणा’त दिलेल्या कथेनुसार सिलाद नावाचे नेत्रहीन ऋषी होते. त्यांना मानवापासून न झालेला पण अमर्त्य असा पुत्र हवा होता. तेव्हा इंद्राने त्यांना शिवशंकरांची तपश्चर्या करण्याचा सल्ला दिला. त्याप्रमाणे त्यांनी शिवाची कठोर तपश्चर्या केली. शिवाने प्रसन्न होऊन त्यांना तसा वर दिला. एकदा सिलाद यज्ञ करत असताना त्यातून अगदी शिवासारखा दिसणारा एक मुलगा बाहेर आला. त्यालाही शिवासारखेच चार हात, त्रिनेत्र व जटामुकुट होते. त्याने आपल्या हातात शूल, टंक, गदा आणि वज्र धारण केले होते. शंकरांनी त्याचे नाव ‘नंदी’ असे ठेवले.
नंदीचे उपनयन झाले व लवकरच त्याने वेदाध्ययनात प्रावीण्य मिळवले. मात्र काही काळाने मित्र व वरुण या दोन ऋषींनी सांगितले की तो अल्पायुषी आहे. तेव्हा नंदीने घोर तप करण्यास सुरुवात केली. शेवटी शिव प्रसन्न झाले, त्यांनी त्याला आलिंगन दिले व आपल्या गळ्यातील हार त्याच्या गळ्यात घालून नंदीला वृद्धत्व आणि मृत्यू यांतून मुक्त केले; त्याची नेमणूक आपल्या गणांच्या प्रमुखपदी केली आणि मरुताची कन्या सुयशा हिच्याशी त्याचा विवाह लावून दिला.
‘रामायणा’त नंदीकेश्वर हा शिवाचा एक अवतार म्हणून येतो. कैलासाकडे जाणाऱ्या रावणाला त्याने अडवले. रावणाने त्याला उद्देशून अवमानकारक शब्द वापरले तेव्हा नंदीने त्याला शाप दिला की तुझ्या वंशाचा नाश हा माकडांच्या हातून होईल. ‘भागवतपुराणा’त असे वर्णन आहे की, यज्ञप्रसंगी दक्ष-प्रजापतीने शिवाबद्दल जे अपशब्द उच्चारले ते असह्य झाल्याने नंदीने त्याची चांगलीच कानउघाडणी केली. ‘विष्णुधर्मोत्तर पुराणा’तील वर्णनानुसार नंदीला तीन डोळे, चार हात असावेत व तो लाल रंगाचा असावा. त्याने व्याघ्राजिन (वाघाचे कातडे) परिधान केलेले असावे. त्याच्या हातात त्रिशूळ असून लोकांची व्यवस्था करण्याकडे त्याचे लक्ष असावे. नंदीकेश्वर बऱ्याच वेळा वृषभरूपात किंवा शिवाचे प्रतिरूप असा चित्रित केलेला असतो. प्रत्येक शिवमंदिरात गाभाऱ्याकडे तोंड करून वृषभरूपी नंदी बसलेला दिसतो.
इ. स. ११ व्या शतकातील चोळ शैलीत घडवलेली नंदीची पंचधातूची एक सुंदर प्रतिमा वेलुवर (तमिळनाडू) येथे आहे. तो त्रिभंग अवस्थेत उभा असून त्याच्या जटामुकुटात गंगा व चंद्रकोर आहेत. त्याच्या मागच्या दोन्ही हातांत परशू व मृग असून पुढचे दोन्ही हात नमस्कारमुद्रेत आहेत. पत्नी सुयशासह ते पद्मपीठावर उभे आहेत.
संहार मूर्ती :-
कालारी शिव अथवा मार्कंडेयानुग्रह शिवमूर्ती.
मार्कंडेयानुग्रहमूर्ती आणि कालारीमूर्ती या वास्तविक एकच होत. ह्या मूर्तीचा समावेश एकाचवेळी अनुग्रह आणि संहार अशा दोन्ही प्रकारांमध्ये होतो याचे कारण म्हणजे मार्कंडेयावर अनुग्रह करून शिव साक्षात कालरूपी यमाचे पारिपत्य करीत आहे.
याची थोडक्यात कथा अशी.
पुराणकथेप्रमाणे निपुत्रिक असलेल्या मर्कंड ऋषींच्या तपश्चर्येमुळे प्रसन्न होऊन शंकर त्यांना अतिशय विद्वान पुत्र होईल असा आशिर्वाद देतो. मर्कंडाचा हा अल्पायुषी पुत्र शिवाच्या उपासनेत गढून जातो. मार्कंडेय १६ वर्षाचा होतो तेव्हा त्याचे प्राण हरण करायला खुद्द यम तिथे येतो. प्रार्थनेत गढलेल्या मार्कंडेयाच्या गळ्यात यम आपला यमपाश आवळतो. मार्कंडेयासारख्या भक्ताला यम ओढून नेत आहे हे शिवाला सहन न होऊन तो पिंडीतून प्रकट होऊन साक्षात यमधर्मावर क्रोधाने लत्ताप्रहार करून त्याला दूर ढकलून देतो. भयभीत यम शंकराची प्रार्थना करून त्याजकडे अभयदान मागत आहे. यमधर्मरूपी साक्षात कालाचे पारिपत्य करून मार्कंडेयाला जीवदान दिल्याने शिवाच्या ह्या रूपाला कालारी शिव अथवा कालांतक शिव असेही म्हटले जाते.

वेरूळ येथील कैलास लेणीच्या प्रदक्षिणापथावर असलेली कालारी शिव प्रतिमा
अंधकासुरवध :-
मंदार पर्वतावर एक सुंदर दिवस उगवला. भगवान शिव चिंतन मुद्रेत होते, तर देवी पार्वती शृंगार मुद्रेत होत्या. भगवान शिवांचे दोन्ही डोळे पुर्ण उघडे आणि व्यग्र होते, जणू ते भविष्याचा वेध घेत होते. मात्र त्यावेळी पार्वती मातेला वाटले कि भगवान शिव त्यांच्याकडे लक्ष देत नाहीत. त्यांनी शिवशंकराचे लक्ष वेधून घेण्याचा प्रयत्न केला, मात्र शिव आपल्या विचारात व्यग्र राहीले. तेव्हा पार्वतीना लक्षात आले कि जोपर्यंत शिवशंकरांचे डोळे उघडे आहेत, तोपर्यंत शिव फक्त जगाचा विचार करतील. म्हणून शंकराचे लक्ष विश्वापासून स्वतःकडे वळवण्यासाठी त्यांनी आपल्या कमलहस्ताने शिवाचे डोळे झाकले. मात्र यामुळे विश्वात गोंधळ निर्माण झाला. जशी भगवान श्ंकरांचे डोळे बंद झाले तसा सर्वत्र अंधार पसरला.
देवी पार्वतीने भगवान शिवांचे डोळे बंद करतानाचे शिल्प, एकंबरेश्वर मंदिर, कांचीपुरम
भगवान शिवांचे डोळे बंद राहिल्यामुळे प्रंचंड उष्णता वाढली व नेत्र आग ओकू लागले, त्याची झळ देवी पार्वतीच्या हातांना लागली व हात घामाने थबथबले, तो घाम जमीनीवर पडला व त्यातून अंधकासुर निर्माण झाला. हे विचित्र, कुरुप दिसणारे आणि अंध असे मुल जन्माला आले. याच्या जन्माच्या वेळी भगवान शंकरांचे डोळे बंद असल्यामुळे जन्मलेल्या मुलाचे डोळे अंध होते. आपलयाकडून जन्म झालेले हे विचित्र मुल पाहून पार्वती भयभीत झाली. मात्र शंकंरानी तिची समजुत काढली कि आपल्या मिलनातून हा पुत्र जन्माला आल्यामुळे आपल्याला त्याला स्विकारावेच लागेल. नेमक्या याच वेळी हिरण्याक्ष हा राक्षस पुत्रप्राप्तीसाठी भगवान शिवांची आराधना करत होता. या हिरण्याक्ष नेमका कोण होता ? हे पाहुया.सप्तर्षीपैकी एक असलेले कश्यप ऋषीना तेरा पत्नी होत्या. या तेरा बायका एकमेकाच्या सख्या बहिणी होत्या. या सर्व दक्ष प्रजापतीच्या मुली होत्या. या तेरा पत्नीपैकी एक होती दिती. जेव्हा समुद्रमंथन झाले, तेव्हा त्यामध्ये राक्षसांवर अन्याय झाला असे दितीचे मत होते. तीने काश्यप ऋषींकडे हा अन्याय दुर करण्यासाठी शक्तीशाली पुत्र मागितला, जो राक्षस कुळाचे सामर्थ्य पुन्हा निर्माण करेल. यामधूनच हिरण्यकशिपु आणि हिरण्याक्ष यांचा जन्म झाला.
नरसिंहाने भक्त प्रल्हादाल वाचवण्यासाठी हिरण्यकश्यपुचा वध करतानाचा शिल्पपट, पट्टदकल, कर्नाटक
अर्धवट कोरलेले अंधकासुर वधाचा शिल्पपट, वेरुळ, महाराष्ट्र
अंधकासुराने ब्रह्मदेवाचे स्पष्टीकरण मान्य केले आणि विचारले, "मग मी दीर्घायुष्य मागू शकतो का?" भगवान ब्रह्मदेवाने उत्तर दिले, "हो ! तु असे वरदान मागू शकतोस."
शक्तिशाली अंधकासुराने इंद्राचा अनेक वेळा पराभव केला आणि त्याच्या दरबारातून अनेक अप्सरांचे अपहरणही केलं. त्रासलेला देवांचा राजा अंधकासुरापासून मुक्त होण्यासाठी नारद मुनींकडे मदतीसाठी गेला.
हा एक सापळा होता कारण नारद मुनींना माहित होते की हा हंकारी गर्विष्ठ राक्षस लवकरच मंदार पर्वतावर स्चारी करेल जिथे त्याची गाठ भगवान शिवाशी होईल आणि देवी पार्वतीसह मंदार पर्वतावर वास करणारे भगवान शिव याचा वध करतील. अपेक्षेप्रमाणे अंधकासुराने स्वारी करुन मंदार पर्वताच्या शिखरावर एक सुंदर शहर वसवले. एके दिवशी अंधकाचे तीन मंत्री - दुर्योधन, विघास आणि हस्ती यांनी एका सुंदर स्त्रीला तिथे विहार करताना पाहीले आणि ते चकित झाले आणि त्या सुंदर स्त्रीच्या मागे गेले. एका गुहेत ती सुंदर स्त्री एका तपस्वी पुरुषासोबत ( भगवान शिव) रहाताना दिसली. त्या स्त्रीवर मोहीत झालेल्या मंत्र्यांनी अंधाकाला देवी पार्वतीची माहिती दिली. त्यांनी त्याला सल्ला दिला, “ही स्त्री एखाद्या रत्नासारखी आहे. तुझ्या अनेक सुंदर बायकांमध्येही तिच्या सौंदर्याशी बरोबरी साधणारी कोणीही नाही. ती तुझी बायको असावी.”हे वर्णन एकून धकाला, त्या स्त्रीची इच्छा झाली. त्याने मदिरा प्याली आणि स्त्रीच्या सौंदर्याचे वर्णन एकून एखाद्या मत्त झालेल्या हत्तीप्रमाणे राजवाड्यातून त्या गुहेच्या दिशेने निघाला.
अंधकासुरवध शिल्पपट:-
अंधकासुराचा वधाचे शिल्प वेरुळमध्ये अनेक ठिकाणी दिसते. परंतु त्याचा सर्वोत्कृष्ट आविष्कार दशावतार लेंणे (क्र.१५) मध्ये दिसतो. शिवाने अंधकासुराला म्हणजे अज्ञानाच्या राक्षसाला भाल्याच्या टोकावर घेतले आणि दूर अंतराळात भिरकावून दिले. ही क्रिया या शिल्पामध्ये अत्यंत आवेशपूर्ण दाखविली आहे. परंतु दैवीकरण करणे म्हणजे काय तर हेच कृत्य करायला माणसाला प्रचंड शक्ती वापरायला लागली असती. तर इथे मात्र शिवाने अत्यंत लीलया हे केल्याचे शिल्पकाराने कोरले आहे. त्या अचाट शक्तीला पाहून प्रभावित झालेली पार्वती शेजारी कोरलेली आहे. अंधकासुराच्या शरीरातून पडणाऱ्या प्रत्येक रक्ताच्या थेंबातून नवीन अंधकासुर जन्माला येणार म्हणून ते पडणारे थेंब गोळा करायला कपाल घेऊन काली शिवाला साहाय्य करीत आहे. कालीचा अजस्त्र आकार शिल्पामध्ये चपखलपणे
गजासुरवध :-
गजासुरवधमूर्ती किंवा गजहामूर्ती ही सर्वांत प्राचीन संहारप्रतिमा समजली जाते. वाराणसी (उत्तर प्रदेश) येथे कृत्तिकेश्वर नावाच्या शिवलिंगाची पूजा करणाऱ्या ब्राह्मणांना हत्तीच्या रूपात येऊन त्रास देणाऱ्या नीलासुर नामक दैत्याचा शिवाने कसा नाश केला त्याची कथा ‘कूर्मपुराणा’त येते. ‘वराहपुराणा’तील कथेनुसार असुरांचा राजा ‘अंधक’ हा पार्वतीवर मोहित झाला. त्याचवेळी त्याचा साहाय्यक नीलासुर याने हत्तीचे रूप घेऊन शिवाला मारण्याचे ठरवले. नंदीने हे वृत्त वीरभद्राला सांगितले तेव्हा त्याने तत्काळ नीलासुराचा वध केला आणि त्याचे कातडे शिवाला अर्पण केले. ते शंकराने उत्तरीय म्हणून पांघरले. यानंतर शिवाने अंधकासुराचाही वध केला.अंकुश घेतलेला, किंवा हत्तीवर बसलेला शिव आपण कुषाण काळांत पाहिला आहे. शिवाचे वाहन बैल व वृषचर्माचा शिवाकडून केला जाणारा उपयोगही मार्गे उल्लेखिला गेला आहे. प्रस्तुत प्रसंगात काही अंशी तसेच साम्य आढळतें.
गजासुरवध वेरुळ :-
कैलास मंदिरात हे शिल्प महायोगी शिवाच्या बरोबर समोरच्या बाजूला कोरलेले आहे. भगवान शिवाचे एक आक्रमक रूप कोरलेले दिसून येते. नीलासुर हा राक्षस मातला आणि देवलोकांना त्रस्त करून सोडले. तेव्हा सर्व देवलोक श्रीशंकराकडे आले. शंकराने सर्व देवांकडे मागणी केली की या युद्धामध्ये तुम्ही सर्वांनी आपापल्या परीने साहाय्य करावे. तेव्हा देवतांनी आपापल्या शक्ती त्याच्या मदतीला पाठवून दिल्या. त्या शक्ती शिल्पांमध्ये शंकराच्या पायाशी बसलेल्या मातृकांच्या रूपाने दिसतात. शिवाने डमरूचा भयंकर नाद करत गजासुरावर आक्रमण केले. प्रथम त्याचा दात तोडला. शिल्पामधील शिवाच्या वळलेल्या मुठीतील दात हे त्याच्या निग्रहाचे प्रतीक आहे. तर गजासुराचे चामडे सोलून ते सूर्याजवळ धरले आणि जाळून टाकले. अशा त-हेने गजासुराला मारले. युद्ध पाहण्यासाठी पार्वती पण आली होती. शिवाचे ते अक्राळविक्राळ रूप, आकाशपर्यंत पसरलेल जटा, विस्फारलेले नेत्र, गळ्यात नररूडांची माळ आणि त्याचा युद्धोन्माद पाहून पार्वती हळूच तेथून सटकण्याच्या तयारीत आहे. शिवाच्या हे लक्षात आल्यावर त्याने त्याही स्थितीमध्ये तिचे समाधान करण्याचा प्रयत्न केला आहे. एका हाताने तिची हनुवटी हळुवारपणे धरून तो जणू तिला सांगायचा प्रयत्न करतो आहे की माझा हा आवेश गजासुरासाठी आहे. तुझ्यासाठी मात्र प्रिये, मी भोळासांबच आहे. कथेतील हा भाग शिल्पकाराने या शिल्पात हुबेहूब साकारलेला आहे.शरभेष :
जालंधरवधमूर्ती :
या प्रकारच्या मूर्तीत शिव द्विभुज, रक्तवर्णी दाखवावा, त्याने छत्र व कमंडलू धारण केलेले असावेत, पायात खडावा आणि जटांमध्ये गंगा व चंद्रकोर असावी. जालंधरही द्विभुज असून अंजलीमुद्रेत असावा, त्याची तलवार मनगटाखाली ठेवलेली असावी आणि त्याच्या हातावर सुदर्शन चक्र असावे असे सांगितले आहे. मात्र अशा प्रकारच्या मूर्तीची अद्याप नोंद नाही.
वीरभद्र :
‘महाभारत’ व ‘भागवता’त आलेल्या या कथेमुळे शिव हा मूलतः वेद व यज्ञसंस्थाबाह्य होता हे कळून येते. शिवाय वीरशैव संप्रदाय हाही वैदिक संस्था आणि वर्णव्यवस्था न मानणारा असावा हे स्पष्ट होते. त्यामुळेच त्यांना वीरभद्र अतिशय पूज्य आहे. वीरभद्राच्या मूर्तींची वर्णने इतर शैवप्रतिमांसोबत येतात, तसेच सप्तमातृकांसोबतही येतात. ‘अग्निपुराण’, ‘मत्स्यपुराण’, ‘श्रीतत्त्वनिधी’, ‘अंशुमद्भेदागम’, ‘कारणागम’, ‘अभिलषितार्थचिंतामणि’, ‘चतुर्वर्गचिंतामणि’, ‘शिल्परत्न’ अशा नऊ ग्रंथांमध्ये वीरभद्राची ११ प्रकारची मूर्तीवर्णने आहेत. ‘श्रीतत्त्वनिधी’मध्ये दिलेल्या वर्णनानुसार तो त्रिनेत्र व चतुर्भुज असावा, त्याने आपल्या हातात खड्ग, बाण, धनुष्य व गदा धारण केलेले असावेत, त्याचे स्वरूप रौद्र असून भयंकर दाढा व गळ्यात रुंडमाळा असाव्यात. त्याच्या डावीकडे भद्रकाली तर उजवीकडे बकऱ्याचे डोके असलेला दक्ष अंजलीमुद्रेत असावा. ‘अंशुमद्भेदागमा’त वीरभद्र नंदीसमवेत असावा असे सांगितले आहे. तो त्रिनेत्र व चतुर्भुज असून त्याने शूल, गदा धारण केलेले असावेत, एक हात अभयमुद्रेत तर दुसरा वरदमुद्रेत असावा. ‘चतुर्वर्गचिंतामणि’मध्येही सोबत नंदी असावा, चार हात त्रिशूळ, वीणा धारण करणारे व कट्यावलंबित असे असावेत असे सांगितले आहे. ‘शिल्परत्ना’त वेगवेगळी वर्णने आहेत: एका वर्णनानुसार वीरभद्र गौरवर्ण असून वेताळावर बसलेला असावा, तो उग्र, पिंगट वर्णाचा, व्याघ्राजिन, चंद्रकोर व सर्प ल्यालेला, हातात खड्ग, शूल, परशू, डमरू, खेटक, कपाल असून एक हात अभयमुद्रेत तर दुसरा वरदमुद्रेत असावा (हातांची संख्या नीट कळत नाही.). सभोवती गण असावेत. दुसऱ्या वर्णनाप्रमाणे वीरभद्र गौरवर्णाचा, पांढऱ्या कमळावर बसलेला, दिगंबर व लहान बालकासारखा असावा. तर तिसरे वर्णन सांगते त्याप्रमाणे तो नंदीवर बसलेला, वरद व अभयमुद्रेत तर मृग व टंक धारण केलेला गौरवर्णीय असावा. त्याने नागाचे यज्ञोपवीत धारण केलेले असावे.
दक्षिण भारतात वीरभद्राचे मोठ्या प्रमाणावर पूजन केले जाते, साहजिकच त्याच्या मूर्ती जास्त सापडतात. चेन्नईच्या शासकीय वस्तुसंग्रहालयात (पूर्वीचे मद्रास वस्तुसंग्रहालय) एक कांस्यप्रतिमा आहे. गोलाकार पीठावर त्रिभंगावस्थेत उभी असलेली ही प्रतिमा बहुधा अष्टभुज असावी, मात्र पुढील दोन हात भग्न झाले आहेत. इतर हातांतील आयुधेही नीट समजत नाहीत. पायात पादुका आणि कपाळावर उभा त्रिनेत्र आहे. वटारलेले डोळे आणि ओठांबाहेर डोकावणारे सुळे त्याचे संहारक रूप स्पष्ट करतात. तेनकाशी (तमिळनाडू) येथील शिवमंदिरात एका खांबावर वीरभद्राची १५ व्या शतकातील एक प्रतिमा आहे. ही मूर्ती दहा हातांची असून उजवीकडच्या तीन हातांत बाण, परशू व खड्ग धारण केले आहेत; उर्वरित दोन हातांपैकी एक भात्यातून बाण काढत आहे तर एका हातात लांब तलवार (आता काहीशी भग्न झालेली) असून ती दक्षाच्या मानेत घुसविली आहे. डाव्या हातांमध्ये धनुष्य, मुसळ, पाश, एक गोल ढाल व एक आयताकृती ढाल अशी आयुधे आहेत. डोक्यावर जटामुकुट असून त्यातून ज्वाळा निघत आहेत. हा वीरभद्र जमिनीवर पडलेल्या दक्षाच्या शरीरावर उभा आहे. हैदराबाद येथील सालारजंग वस्तुसंग्रहालयात वीरभद्राची एक प्रतिमा आहे. तिने पायात पादुका घातलेल्या असून त्याखाली तीन डोकी दाखविली आहेत. त्याच्या डोक्यावर पाच शिवलिंगे असून सूर्य व चंद्रदेखील आहेत. जवळच बकऱ्याचे डोके असलेला दक्षही आहे. जेव्हा वीरभद्र सप्तमातृकामसमवेत शिल्पांकित केलेला असतो तेव्हा तो त्यांच्यासह बसलेला दाखवतात, त्याचे स्वरूप सौम्य असते. वेरूळ येथील लेण्यात अशा काही प्रतिमा आहेत.
या मूर्तीतील आयुध हे ढाल तलवार त्रिशूळ दिसत आहेत मूर्तीस मिषा आहेत एकूणच हे वीरभद्र आहे भैरवनाथ असते तर त्यांचे वाहन कुत्रा शेजारी दिसला असता, वीरभद्र यांचे मुर्ती आहे..
मल्लारी :
भैरव :
काळभैरव महाराज हे अत्यंत पराक्रमी,श्रेष्ठ,शूर, दैदिप्यमान आणि मनोरथसिध्दी असणारे आहेत. त्यांची उपासना ही हमखास लाभदायक ठरते यात शंकाच नाही.कळीकाळावर विजय मिळविणारे, शत्रूंचा संहार करणारे, भयमुक्त करणारे (भय+रव =भैरव) असे हे दैवत आहे. त्यांचा अंमल काळावर आहे
काळभैरव एक तांत्रिक देवता आहे ; हिंदूंचे एक कुलदैवत आहे.हा शंकराचा अवतार असून काळभैरव,काळभैरवनाथ, काळभैरी, भैरव, मार्तंडभैरव, भैरवनाथ, केदारनाथ,बहिरीनाथ, भैरी(नाथ),मल्हारी,भैरोबा,खंडोबा,खंडेराय, रवळनाथ ही त्याची अन्य नावे आहेत.महाराष्ट्रात काळभैरव व भवानी ही अनेक कुटुंबांची कुलदैवते आहेत.काळभैरव-जोगेश्वरी,भैरी-भवानी,भैरी-जोगेश्वरी अशी दैवते कुलस्वामी व कुलस्वामिनीच्या स्वरूपांत पूजली जातात.
भैरव हा शक्तिपीठाचा रक्षक आहे. त्यामुळे सर्वच शक्तिपीठांच्या ठिकाणी भैरवाचे स्थान असते,असे सांगितले जाते.
श्री काळभैरव यांचे प्राचीन मंदीरात गेल्यावर देवाच्या मुर्तीकडे एकटक पहावे . सात्विकता डोळ्यात भरुन येईल.भैरवोत्थान केवळ पद्मासनातच साध्य होते.मोरगाव येथील गणेश मंदीराच्या अकरा पायऱ्याअकरा भैरवाच्या प्रतीक आहेत.
१) प्रमुख - श्री काळभैरव
२) उपप्रमुख - बटुकभैरव
३) समायोजक - स्वर्णाकर्षण भैरव
४) अष्टभैरव - स्मशानभैरव
५) नग्नभैरव
६) मार्तण्डभैरव
७) कपालभैरव
८) चंडभैरव
९) सन्हारभैरव
१०) क्रोधभैरव
११) रुरुभैरव
भैरवाचे एक अत्यंत सुरेख शिल्प हे राणी की वाव-पाटण येथे आहे. या मूर्तीला अठरा हात असून हातांची जणू एक महिरपच त्याच्या भोवती झालेली दिसते. चेहऱ्यावर उग्र भाव दाखविण्यासाठी केवळ त्याचे डोळे वटारलेले आहेत. परंतु त्याची परिणामकारकता दाखविण्यासाठी कलाकाराने चांगलीच कल्पकता दाखवलेली आहे. शंकराच्या पायाखाली एक राक्षस कोरला असून त्याचा एक हात त्याने कापून टाकला आणि मुंडके उडवले असे दाखवले आहे. तोडलेले मुंडके शंकराच्या खालच्या डाव्या हातात केसाने धरलेले असून त्याच्या खाली एक श्वान आहे जो त्याच्या मानेतून टपकणाऱ्या रक्ताचे थेंब चाटताना दाखवले आहे. शंकराच्या उजव्या पायाजवळ त्याचा एक अस्थिपंजर परंतु जटाधारी गण आहे जो त्या दैत्याचा तुटलेला हात चावून खायचा प्रयत्न करतो आहे. (बीभत्स रस हा दाखवू नये असा संकेत असला तरी कलाकाराने या शिल्पात तो अत्यंत सूचकतेने दाखवला आहे.)
इसवी सन १४ व्या शतकात गोवा राज्यातील उसगाव, पोंडा, येथे सापडलेली ही मार्तंड भैरवाच्या मुर्ती, या भैरवाला माणसांसारखे दोनच हात आहेत
गोवा आणि कोकणात शिवगणांमधे वेताळ आणि अन्य स्थानिक राखणदार समजले गेलेल्या देवांचा समावेश होतो.
हा लोलये येथील बेताळ.
वेरूळ येथील लेणी क्र. २१ येथील असितांग भैरव.
खिद्रापूरच्या कोपेश्वर मंदिराच्या बाह्यभिंतीवर कोरलेली भैरवमूर्ती.
खिद्रापूर येथीलच गजारूढ भैरव
गोंदेश्वर मंदिर, सिन्नर येथील भैरवमूर्ती

भुलेश्वर मंदिर, पुणे येथील उजवीकडील दोन भैरवमूर्ती

पूरच्या कुकडेश्वर मंदिरावरील भैरव प्रतिमा

रांजणगावाजवळील पिंपरी दुमाला येथील दुर्लक्षित मंदिराच्या बाह्यभागावरील ही भैरव प्रतिमा
पेडगाव येथील अप्रतिम शिल्पकेलेने समृद्ध असलेल्या लक्ष्मीनारायण मंदिराच्या बाह्यभिंतीवरील भैरव मूर्ती

वरील फोटोतील "भैरव" नेपाळमध्ये आहे. या भैरवाला दारूचा नैवेद्य आवडतो. "नैवेद्य" मूर्तिवर दिसत असलेल्या छिद्रात टाकायचा असतो
महाराष्ट्रातील जवळपास प्रत्येक गावात भैरव वा काळभैरवाच्या मूर्ती आढळतात. त्याला भैरोबा, क्षेत्रपाल असेही म्हटले जाते.कणात आढळणार्या वेताळ मूर्ती म्हणजे असितांग भैरवाचाच एक प्रकार.मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज वस्तुसंग्रहालयात १२ व्या शतकातील भैरवाची एक सुंदर चतुर्भुज प्रतिमा आहे. त्रिभंगावस्थेत उभ्या भैरवाच्या मागील दोन हातात त्रिशूळ, डमरू व पुढील उजव्या हातात तलवार व डाव्या हातात कपाल आहे, त्याच हाताने नरमुंडाचे केस धरले आहेत. नग्न मूर्तीच्या गळ्यात रुंडमाळा व इतर आभूषणे आहेत, कानात चक्राकार कुंडले, पायात वलये आणि पादुका आहेत. मस्तकाभोवती, गळ्यात, मांड्यांभोवती नागाची वेटोळी असून पायांजवळ गण आणि एक कुत्रा दिसतो; तो वर लोंबकळणाऱ्या मस्तकातून गळणारे रक्त चाटत आहे. पार्श्वभूमीवर अलंकारिक मकरतोरण आहे. मार्कंडी (जि. गडचिरोली) येथील मार्कंडऋषी मंदिराच्या बाह्यभिंतीवर भैरवाच्या दोन प्रतिमा असून त्यांपैकी एक चतुर्भुज तर दुसरी अष्टभुज आहे. अष्टभुज भैरवाच्या उजवीकडील हातात खटवांग, कपाल, नरमुंड आणि कर्तरी आहे; तर डावीकडील हातात डमरू, त्रिशूळ, खड्ग आहे. ही प्रतिमा नग्न असून तिला दाढी-मिशा आहेत. त्याच्या कटिसूत्राला दोन घंटा बांधलेल्या आहेत व गळ्यात पाच मुंडक्यांचा लंबहार आहे. त्याच्या पायांमागे तीन कुत्री आहेत. येथील चतुर्भुज प्रतिमाही अशीच उग्र आहे. त्याच्या उजव्या हातांत खड्ग व गजदंत तर डाव्या हातांत खेटक व नरमुंड दिसते. त्याने आपला उजवा पाय खाली पडलेल्या प्रेताच्या पायावर रोवला आहे.
नृत्य भैरव होट्टल :-
शैव मंदिरांवर भैरवाच्या मूर्ती प्रामुख्याने आढळून येतात. या मूर्तीचे हात खंडीत आहेत. या हातात त्रिशुळ, डमरू अशी आयुधे सहसा असतात. शिवाय एका हातात नरमुंड ही असते. मूर्तीच्या डाव्या बाजूला खाली श्वान दाखवले आहे वर मान केलेले. ते नरमुंडातून ठिबकणारे रक्त चाटत असते. भैरवाच्या अंगावर वस्त्र नाहीत. पायावर नरमुंडमाला लोंबत आहे. डोक्यावर मागे ज्वालेसारखे दिसणारे प्रभामंडल आहे. कपाळावर पट्टा आहे. पाठशिळेच्या वरच्या भागात किर्तीमुख आहे. सहसा भैरवाचे डोळे बटबटीत, चेहरा भयानक दाखवला जातो. पण इथे चेहरा सौम्य आहे. मांडीवर साप गुंडाळलेला आहे. कमरेच्या मेखलेची माळ मांडीवर रूळत आहे. त्याच्या खालच्या टोकाला घंटा आहेत.
पायात नुपुर आहेत. पायाचा कमरेपर्यंतचा भाग एका रेषेत, कमरेपासून मानेपर्यंत दूसर्या कोन रेषेत. आणि मानेपासून वरती परत वेगळ्या रेषेत अशी ही त्रिभंग मूद्रा आहे. नृत्यमुद्रेत हीची गणना होत असल्याने नृत्य भैरव असा याचा विचार करावा लागेल.
या मूर्तीचे वैशिष्ट्य म्हणचे पादत्राणे. उंच टाचेच्या सँडल्स असतात त्या प्रकारचे वेगळे असे हे पादत्राण आहे. हे अशा पद्धतीनं कुठे दिसत नाही.
होट्टल (ता. देगलुर जि. नांदेड) येथील मंदिराच्या बाह्य भागावर ही भैरवमूर्ती आहे. याच्या आजूबाजूला सुरसुंदरींची शिल्पे आहेत. या मूर्तीला मिळालेले स्थान तिला देवता मानल्याचे सुचित करते.
भैरव मूर्ती - वालूर :-
वालूर (ता. सेलू जि. परभणी) येथे वाल्मिकेश्वर मंदिर आहे. मंदिर आता नव्याने बांधलेले आहे पण हा परिसर प्राचीन अवशेषांनी भरलेला आहे. शेषशायी विष्णु, हात जोडलेला गरूड, आसनस्थ शिव पार्वती, विष्णुच्या हातातील चक्र, रिद्धी सिद्धीसह गणेश असे कैक अवशेष या परिसरात विखुरलेले मंदिरा समोरच्या वडा खाली आढळून येतात. एक प्राचीन बारव आहे जी आता जवळपास बुजली आहे.
मंदिराच्या भिंतीला टेकून ही भैरवाची मूर्ती ठेवलेली आहे. याच्या वरच्या दोन हातात त्रिशुळ आणि डमरू आहे. डोक्यावरचे केस मुंड माळेने बांधलेले आहेत. मस्तकामागे ज्वालेप्रमाणे गोलाकार प्रभा मंडळ आहे. खालचा उजवा हात भंगलेला असून डाव्या हातात नरमुंड आहे. डाव्या बाजूला खाली या नरमुंडातून टपकणारे रक्त चाटणारा कुत्रा आहे. नग्न भैरवाच्या कमरेला साखळी असून मांड्यांवर घंटा लोंबत आहेत. डाव्या बाजूला गण आहे. उजव्या बाजूस भुतनाथ आहे. गुडघ्यावरून खाली मुंडमाला लोंबते आहेत. ललित मुद्रेत भैरव उभा आहे. एरव्ही उग्र दाखवला जाणारा हा भैरव इथ शांत चेहर्याचा दाखवलेला आहे.
या परिसरातील प्राचीन शिल्पावशेष, मंदिरांची अवस्था, बुजलेल्या बारवा पाहून अतोनात दू:ख होते. इतकी अनास्था का आहे? जरा जागरूकता दाखवली तर भव्य वाडे असलेले हे एकेकाळचे संपन्न गाव संस्कृती ग्राम म्हणून (हेरीटेज व्हिलेज) पर्यटकांचे आकर्षण बनु शकते.
भैरव मूर्ती - निलंगा :-
निळकंठेश्वर मंदिर (ता. निलंगा जि. लातूर) येथील अप्रतिम मूर्ती भैरवाची आहे. मुर्तीच्या उजव्या वरच्या हातात डमरू आहे. खालचा हात भग्न आहे. डाव्या हातात त्रिशुळ असून खालच्या हातात नरमुंड आहे. त्यातून टपकणारे रक्त पिण्यासाठी कुत्रा जिभ चाटत दोन पायांवर उभा आहे. भैरवाच्या पायावर मुंडमाळ लोंबत आहे.
भैरवमूर्ती नग्न दाखवली जाते तशीच ती इथेही आहे. भैरवाच्या डोक्यामागे ज्वालेसारखे दिसणारे प्रभामंडळ आहे. कपाळावर पट्ट आहे, कानात कुंडले, गळ्यात हार, कटिसूत्र, मांडीवरील साखळ्यांना घंटा आहेत. दंडांवर बाजूबंद आहेत. पायात तोडे आहेत. डाव्या बाजूला कुत्रा असून उजव्या बाजूला भुतनाथ आहे. भैरवाच्या चेहर्यावरचे भाव उग्र असतात पण हा भैरव शांत चेहर्याचा दर्शवलेला आहे.
त्रेतायुगात वडनेर भैरव येथे नदीकिनारी (नेत्रावती) एका विहीरीतुन साक्षात कालभैरव रूप भैरवनाथ प्रकट झाले, ही आख्यायिका नाही, हकिकत आहे..तेथे चंडकेशर नावाचा एक राक्षस जोगेश्वरी देवींना त्रास देऊ पाहत होता,जोगेश्वरी देवींनी महादेवाचा धावा केला.साक्षात काशी विश्वेश्वराने आपल्या रुपातील अष्टभैरवांपैकी एका रुपाला जोगेश्वरी देवींची रक्षा करण्यासाठी वडनेर भैरव येथील त्या नदीकिनारी असलेल्या विहीरीतुन प्रकट होण्याची आज्ञा केली कालभैरव प्रकट होऊन चंडकेशर नावाच्या राक्षसाचा पराभव केला आणि त्या खोल विहीरीत त्या चंडकेशर राक्षसास कैद केले वरुन ती विहीर मोठ्या दगडाने झाकुन टाकली,(त्या विहीरीत आजही आवाज ऐकू येतो मला वर काढा.) नंतर जोगेश्वरी देवीने भैरवनाथ यांना वरले त्या ठिकाणी आजही चैत्र महिन्यात भैरवनाथ जोगेश्वरी यांचा विवाह होतो, रथ यात्रा निघते त्या विहिरीजवळ जे जोगेश्वरी मातेचे घर होते तेथे जानोसघर म्हणुन आजही वर्षातून एकदा लाखोंचा संख्येत लग्न होते भैरवनाथ जोगेश्वरी मातेचे.मुर्ती त्रेतायुगापासुन तीच आहे,संपुर्ण शृगांर सोनेचांदीचा आहे,देवाला कपडे दागिने,पाच दिवस हळद समारंभ होतो,जागृत देवस्थान आहे
भुबनेश्वर स्टेट म्युझियम, ओडिशा येथील भैरव मुर्ती :-
आता आपण जे शिल्पं बघणार आहोत ते भुबनेश्वर येथील संग्रहालयात असलेला भैरव आहे. डावीकडून शिल्पाचे निरीक्षण करूयात.
भैरव हा बहुतांशी वेळेला नग्न दाखवला जातो. पायाशी त्याचे गण किंवा सेवक कोरलेले आहेत. खडावा (हाय हिल्स) घालून तो उभा आहे. चतुरहस्त - चार हातांचे शिल्पं आणि हातामध्ये खड्ग - तलवार, त्रिशूळ, डमरू आणि माणसाचे तुटलेले मुंडके पकडले आहे. त्या मुंडक्यातून येणारे रक्त आणि मांस खाण्यासाठी खाली असलेला कुत्रा वर बघतो आहे (इथे कुत्र्याचे तोंड तुटले आहे). वरून पायाकडे जाताना मुकुटमध्ये मध्य भागी कोरलेला नागाचा फणा आणि खाली नरमुंड, कपाळाच्या मधोमध तिसरा डोळा, भुवया वर खचलेल्या, डोळे वटारलेले, ओठांमधून बाहेर आलेले सुळे, या उग्र रुपात कोरलेले सुंदर दागिने, कमरेचा बाक अत्यंत सुंदर कोरला आहे, संपूर्ण नग्न शिल्पं, कमरेपासून खाली नरमुंड माळा आणि गुडघ्यांवर वेटोळा मारून बसलेला नाग. उग्र रूप म्हणजे नक्की काय हे या शिल्पावरून आपल्याला कळतं. अनेक रसांपैकी एक बीभत्स रस तो या शिल्पात आपल्याला दिसतो.
प्राचीन संहिता, पुराणकथा आणि त्यामध्ये गुंफलेल्या काही संकल्पना या मूर्त रुपाला जन्म देत असतात. रुद्र हातामध्ये धनुष्य धारण करून रथात आरूढ होणारा त्रिपुरान्तक शिव या संहारक रूपातून व्यक्त होताना दिसतो. तैत्तिरीय संहिता आणि शतपथ ब्राह्मणासारखे काही प्राचीन ग्रंथ आणि महाभारत, लिंगपुराण आणि शिवपुराणांतून आलेल्या रोचक कथा शिल्पकारांना ही तितीक्याच आव्हानात्मक ठरलेल्या दिसतात. या पुराणांमध्ये त्रिपुरान्तक आख्यानाचे अतिशय सुंदर आणि मनोरंजक वर्णन प्रस्तुत केलेले आहे.ही कथा ‘तैत्तिरीय संहिता’, ‘ऐतरेय ब्राह्मण’, ‘शतपथ ब्राह्मण’ व ‘महाभारता’त येते.

विश्वकर्मा या कार्यात शिवासाठी पृथ्वीपासून महादिव्य सुवर्णाच्या रथाचा निर्माण करतात. मंदार पर्वताचा अक्ष करून या रथाचे उजवे चाक हे सूर्य बनतो. ज्याचे बारा आरे म्हणजे बारा आदित्य असतात. डावे चाक चंद्रमा बनतो. ज्याला सोळा आरे म्हणजे चंद्राच्या सोळा कला असतात. सत्तावीस नक्षत्र या दोनही चाकांची शोभा वाढवत असतात. संवत्सर रथाचा वेग बनतो. रथाचे उपचक्र म्हणून पर्वतराज हिमालय आणि विद्याद्री यांची व्यवस्था केली गेली. सप्तऋषींना चाकावर गोलाकार बसविण्यात आले. गंगा, सरस्वती आणि सिंधू या नद्यांना चाकाच्या अक्षाच्या खिट्या किंवा पाचर बनविण्यात आले.कला त्या रथाचे खिळे बनतात. द्युलोक त्या रथाचे छत बनते. स्वर्ग आणि मोक्ष त्याचा ध्वज बनतो. वेदांग, पुराण, न्याय, मीमांसा आणि धर्मशास्त्र त्या रथाचे अलंकार होतात. पुष्कर सारखी तीर्थे रत्नजडित सुवर्णमयी पताका बनतात. चार समुद्र रथाचे आच्छादन वस्त्र बनते. सप्तवायू सुवर्णमयी उत्तम सोपान बनतात.
साक्षात सृष्टीकरता ब्रह्मदेव या रथाचे सारथी होतात आणि प्रणवाकार ओम चाबूक बनतो. चार वेद रथाचे चार घोडे होतात. नागराज कालपृष्ठ, नहुष, करकोटक आणि धनंजय हे अश्वाना बांधून ठेवणारे पट्ट झाले. यासोबतच कृती, सत्य, वैराग्य आणि ऐश्वर्य यांना घोड्याचे लगाम बनविले गेले. शैलराज हिमालय धनुष्य बनून रुद्राच्या हातामध्ये स्थिरावते. शेषनाग त्या धनुष्याची प्रत्येंचा बनतात. श्रुतीरूपिणी सरस्वती देवी त्या धनुष्याची घंटा बनते. जगत्पालक विष्णू त्या दिव्य शक्तिशाली धनुष्याचा महातेजस्वी बाण बनतात. त्या बाणाचे अग्र अग्नी आणि यम त्याची पिसे बनतो. हा सज्ज झालेला दिव्य रथ साक्षात रुद्राच्या स्पर्शाने डगमगतो तेव्हा नंदी त्याच्या बळाचे सहाय्य त्या रथाला देतो. ब्रह्मदेव रथाचा लगाम सावरून रथ त्रिपुरांवर चाल करण्यास सज्ज करतात. ही तीन दिव्य पुरे अनेक वर्षांनी जेव्हा एका सरळ रेषेत येतात तेव्हा रुद्र त्याच्या दिव्य तेजस्वी बाणाने त्यांच्या भेद घेतो. त्या पुरांचा त्या तीनही दैत्यांसकट सर्वनाश होतो. या कथेच्या तपशिलाबद्दल संहिता, ब्राह्मण्ये व ‘महाभारत’ यांत वैविध्य आढळते.
या कथेतील गुढ अर्थ असा मानला जातो कि असुरांनी ज्या तीन नगरावर ताबा मिळवला ती म्हणजे गर्व, क्रोध आणि भ्रम आहेत. असुरांना नष्ट करण्यासाठी जो बाण वापरला, त्यात अग्नी आहे, जो यज्ञ आणि अनुष्ठाणात वापरल्या जाणार्या अग्नीचे प्रतिनिधीत्व करतो. भगवान शिवांनी जेव्हा असुरांचा वध केला तेव्हा पृथ्वी, वायु आणि आकाशामधून असुरी शक्ती नाश पावल्या असा त्याचा अर्थ आहे. आध्यात्मिक दृष्टीने भगवान शिवांनी असुरी शक्तींचा नाश करुन जणू विश्वाचे शुध्दीकरण केले आहे. अर्थात तारकाक्ष, कमलाक्ष आणि विद्युन्माली यांनी देवांना आणि ऋषी, मुनींना त्रास देण्याचे चुकीचे काम केले असले तरी ते सुरवातीला भगवान शिवांचे भक्त होते. त्यामुळे जेव्हा त्यांनी आपल्या चुकांसाठी पश्चाताप व्यक्त केला, तेव्हा शिवांनी त्याला क्षमा करुन आपल्या गणांत समावेश करुन घेतला आणि त्यांना चामराने वारा घालण्याच्या सेवेची जबाबदारी दिली.
कथेचा सांराश :-
हि कथा आपल्याला जीवनातील चुकीच्या गोष्टी आणि त्यावर केली जाणारी मात याचे मार्गदर्शन करते. या कथेत सांगितलेली तीन पुरे म्हणजे मानवी इच्छेचे प्रतिक ज्यामुळे मनुष्य प्रगतीचे रस्ते शोधतो. मात्र जेव्हा या कामना, आकांक्षा पुर्ण होत नाहीत, तेव्हा तो क्रोधीत होतो. मात्र एखादी इच्छा पुर्ण झाली कि तो संतुष्ट न होता आणखी जास्त मिळावे यासाठी प्रयत्न करु लागतो. यातून लालच वाढत जाते. मिळालेल्या यशामुळे मानव अहंकारी होतो. त्याचबरोबर उपभोगाची आसक्ती वाढत जाते. वासना, क्रोध आणि लालसा या मानवी जीवनातील तीन मोठे दुर्गुण आहेत, जे त्या तीन असुर बंधूच्या स्वरुपात दाखवले आहेत. मात्र हे दुर्गुण सोडून मनुष्य धर्माच्या योग्य मार्गावर चालु लागतो, तेव्हा मिळणार्या ज्ञान किंवा प्रेमाच्या बाणाने या तिन्ही दुर्गुणांना नष्ट केले जाते. थोडक्यात आपण कोणता मार्ग स्विकारतो यावर काय होणार हे अवलंबून आहे. अर्थात या युध्दात जसा मयासुर वाचून पळून गेला आणि पुन्हा या तीन पुरांचे निमिती करतो. याचा अर्थ मानवाला सदैव सावध राहीले पाहीजे आणि आपल्या आयुष्यात पुन्हा मायेच्या रुपात येणारी ही तीन पुर म्हणजे वासना, क्रोध आणि लालसा यांच्यापासून दूर राहीले पाहीजे,.
त्रिपुरांतक मुर्तीचे शास्त्र :-
त्रिपुरांतक मुर्तीचे महत्वाचे वैशिष्ट्य म्हणजे उजव्या हातात असलेला परशु आणि काळवीट दाखवले असते. जर या अवताराच्या शिल्पात भगवान शिवांना चार हात दाखवले असतील तर खालच्या हातात धनुष्य आणि बाण तर वरच्या हातात परशु आणि काळवीट दाखवले असते. शिवांनी मस्तकावर जटामुकुट धारण केलेला असतो. कपाळावर तिसरा डोळा तसेच कानात मकर कुंडले दाखवली असतात. त्यांनी लाल रंगाचे दागिने परिधान केलेले असतात. या रुपात शिवांनी राक्षसांच्या तीन शहरांचा म्हणजे पुरांचा नाश केला म्हणून याला त्रिपुरांतक शिव म्हणले जाते. आध्यात्मात हि तीन पुरे म्हणजे मनुष्याची तीन शहरे मानली जातात, यामध्ये स्थुल शरीर - बाह्य अवतार, सुक्ष्म शरीर- बौध्दीक कोष आणि कारण शरीर किंवा आत्मा. भगवान शिव या तिन्ही पुरांना नष्ट करतात म्हणजे मनुष्याला आवश्यक असणार्या तिन्ही घटकांना सर्वोच्च रुपात विलीन करुन घेतात. शिवशंकराचे हे पौरुष आणि वीरतेचे रुप असल्यामुळे कधी कधी त्यांच्या सोबर त्रिपुरसुंदरी हे स्त्री रुप दाखवले असते.
चोल काळात सोमस्कंद, नटराज आणि चंद्रशेखर शिव यांच्या मोठ्या प्रमाणात कास्य शिल्पे निर्माण केली गेली,तसेच त्रिपुरांतक शिवाच्या मुर्ती ही निर्माण केल्या गेल्या.ज्यातील काही आजही वस्तु संग्रहालयात बघायला मिळतात. त्रिपुरांतक मूर्तींना त्रिपुरा-संहार-मूर्ती, त्रिपुरा-सुंदर, त्रिपुरा-विजय, पुरारी आणि इतर नावे आहेत.मुर्तीशास्त्राच्या ग्रंथांनुसार, मूर्तींना २,४,८ किंवा १० हात असू शकतात. काही ग्रंथांमध्ये आठ प्रकारच्या त्रिपुरांतक मूर्ती आहेत, त्यांच्यातील मुख्य फरक पायाच्या मुद्रा आणि हातांच्या मुद्रांमध्ये आहे. काही प्रकरणांमध्ये उजवा पाय घट्टपणे रोवलेला दाखवला असतो आणि डावा थोडा वाकलेला किंवा त्याउलट असु शकते. काहीं मुर्ती जमीनीवर तर काहींच्या पायाखाली पीठ दाखवले असते. प्रमुख हातात धनुष्यबाण धारण केलेले असतात, त्यांची स्थिती ग्रंथांमध्ये तपशीलवार दिली आहे. सामान्यत: धनुष्य धरणारा पुढचा डावा हात खांद्याच्या वर किंवा बगलेच्या पातळीवर किंवा छातीच्या पातळीवर असू शकतो. जेव्हा मुर्तीला चार हात असतात तेव्हा मागच्याच्या उजव्या हातात कुऱ्हाड आणि डाव्या हातात हरण असते. जेव्हा धनुष्य धरलेला हात खांद्याच्या वर असतो, तेव्हा तोल साधण्यासाठी हरण धरलेला मागचा हात खाली आणला जातो. बहुतेक ग्रंथांमध्ये काही वैशिष्ट्यांचा वारंवार उल्लेख केला आहे. त्रिपुरांतकाच्या रूपात असलेल्या शिवाने सदैव पत्नी गौरी उमासोबत रहावे. पायांपैकी, फक्त डावा पाय जमीनीवर ठेवावा. त्यांना प्रतीकात्मक तसेच खोल धार्मिक अर्थ आहे.
![]() |
चिदंबरमच्या नटराज मंदिरात, घोडे जुंपलेल्या रथावर पार्वतीसह उभ्या असलेल्या त्रिपुरांतकाच्या मुर्ती चारही गोपुरांवर दाखवल्या आहेत. या मुर्ती स्पष्टपणे त्रिपुरांतक शिवाच्या आहेत हे समजते. मात्र त्या सर्व गोपुराच्या दुसर्या मजल्यावर तशीच शिल्पे आहेत. इथे भगवान शिवांनी हातात धनुष्य बाण धारण केलेला आहे, मात्र सोबत पार्वती नाही. अर्थात गोपुरावर असलेल्या मुर्ती ओळखणे अवघड जात नाही, मात्र कस्य शिल्प असतील तर मात्र त्रिपुरांतक मुर्ती ओळखणे जाते. कारण मोठ्या आकाराची मुर्ती असेल तर ती बहुतेक वेळा रथारुढ असते, मात्र छोट्या आकाराची कास्य मुर्ती असेल तर ती एखाद्या पीठावर उभी असते तसेच बर्याचदा पार्वती सोबत असते आणि वेगळ्या पीठावर बसलेली दाखवलेली असते. वस्तुसंग्रहालयात हि शिल्पे मांडताना, ओळख पटवूनच त्याना नाव दिलेले असते, मात्र याच मुर्ती बाहेर मंदीरात किंवा इतरत्र असतील तर बर्याचदा त्यांना चुकीच्या नावाने ओळखले जाते.
या स्वरुपाच्या मुर्तीला कांस्य त्रिपुरा-सुंदर किंवा अधिक योग्य त्रिपुरा-विजय म्हणले जाते, याचा उल्लेख चोल राणी सेम्बियन महादेवीने तिच्या शिलालेखांमध्ये त्रिपुरांतकाऐवजी त्रिपुरा विजय असा केला आहे. त्रिपुरा-विजय कास्य मुर्तीत दोन किंवा चार हात दाखवले असतात. चार पेक्षा जास्त हात असलेली कोणतेही शिल्प अद्याप आढळलेली नाही. निरनिराळ्या मुर्तीत पायांची स्थिती वेगळी असते, परंतु जेव्हा मुर्ती जमीनीवर उभी असते तेव्हा फक्त डावा पाय खाली असतो, उजवा नाही. कोनेरीराजापुरम किंवा कोडुमुडी सारख्या ज्या मंदिरांमध्ये त्रिपुरा-विजय त्याच्या पत्नीसह आढळतो. तेथे सर्व त्रिपुरा-विजय कांस्यां मुर्तीमध्ये सोबतची पत्नी दाखवली आहे आणि जिथे सोबत त्रिपुर सुंदरी दिसत नाही तिथे ती मूळ अस्तित्वात होती, पण आता नष्ट झाली आहे.
बृहदीश्वर मंदिर, तंजावर येथील त्रिपुरांतक शिवाचे भित्तीचित्र
शिवाने भयंकर क्रोधाने तीन शहरे नष्ट केली, ज्याला साहित्यात अनेकदा संहार म्हटले जाते. त्याच्या शिल्पांमध्ये चेहऱ्यावरचा राग दिसायला हवा. भारताच्या नाट्यशास्त्रात चेहऱ्यावर व्यक्त होणाऱ्या उग्र भावनांना 'रौद्र दृष्टी' म्हणतात. या कठोर भावना दर्शवतात, डोळ्यांच्या बाहुल्या मोठ्या , उग्र आणि लाल असाव्यात. भुवया उंचावल्या पाहिजेत. चित्रकलेतील त्रिपुरांतक म्हणून शिवाचे उत्कृष्ट चित्रण तंजावरच्या मंदिरातून आहे जेथे देवाला मोठ्या रागाने भुवया उंचावलेल्या, मोठे आणि बाहेर आलेले डोळ्याच्या बाहुल्या या स्वरुपात दाखवले आहे. या चित्रामधील चेहरा नाट्यशास्त्राशी सुसंगत आहे. हा राग आजवर दिसलेल्या एकाही कांस्य मुर्तीमध्ये दाखवता आला नाही. साराबाई कलेक्शन, तंजावरर आर्ट गॅलरी इत्यादी मधील प्रसिद्ध कास्य मुर्तीमध्ये स्पष्टपणे चेहर्यावर राग दाखवता आलेला नाही तर मुर्तीच्या चेहर्यावरील भाव काहीसे करुण वाटतात. ज्या मुर्तीच्या चेहर्यावर पुन्हा काही बदल केले गेले नाहीत त्या कांस्य शिल्पाचा विचार केला तर शिल्पकाराचा मूळ हेतू कळू शकतो. कांस्य मूर्ती मिरवणुकीत आशीर्वाद देण्यासाठी आणलेल्या देवतांच्या असल्याने, शिल्पकामासाठी निवडलेला क्षण हा त्रिपुराच्या विनाशानंतरचा आहे, जेव्हा शिवाने तीन पराभूत असुरांना वरदान दिले होते. म्हणून हे त्रिपुरा-विजय शिल्प आहे, ज्याचा उल्लेख सेम्बियन-महादेवीने योग्यरित्या केलेला आहे,
प्रत्येक दैवी घटना हि अनेक छोट्या, छोट्या प्रसंगाची मालिका असते, तेव्हा शिल्प कोरण्यासाठी नेमका कोणता प्रसंग निवडायचा याचा निर्णय शिल्पकार त्याच्या समजुतीनुसार घेत असतो. याच कारणाने कास्य मुर्ती घडवताना शिल्पकारांनी भगवान शिवाचे उग्र रुप न निवडता त्याने तीन असुर बंधुवर विजय मिळवला , तो क्षण निवडला, म्हणूनच या मुर्तींना त्रिपुरांतक न म्हणता त्रिपुर विजय म्हणले आहे.
आतापर्यंत सापडलेल्या कांस्य मुर्तीतील सर्वात जुना त्रिपुरा-विजय शिल्प तंजावर जिल्ह्यातील कुलप्पाडूच्या मंदिरात पूजेसाठी ठेवण्यात आले आहे आणि हि मुर्ती आठव्या शतकाच्या पूर्वार्धातील आहे. ही एक चतुर्भुज मूर्ती आहे ज्याचा डावा पाय जमीनीवर आहे. दुर्दैवाने त्याच्या डोळ्याच्या जवळचा भग्न झालेला आहे. या पल्लव काळातील कास्य मुर्तीमध्ये पुढच्या उजव्या हाताव्यतिरिक्त मागील दोन्ही हातांमध्ये बाण आहेत, ज्याचा उल्लेख ग्रंथात नाही. उत्कृष्ट कारागिरी असलेली दुसरी पल्लव कास्य मूर्ती साराबाईंच्या संग्रहातील आहे. हि मुर्ती कदाचित सर्वात उंच आहे आणि हीचे निर्माण इ.स. ८७५ मध्ये झाले आहे. अशा प्रकारे त्रिपुरा विजयाच्या मुर्ती पल्लव काळात केल्या गेल्या, त्यातीलच हि एक.चोल राजे हे त्रिपुरा-विजय रूपाचे मोठा भक्त होते. या स्वरूपातील बहुतेक सर्वोत्कृष्ट कलाकृती १० व्या ते १३ व्या शतकादरम्यान चोल काळात तयार केल्या गेल्या. कोनेरीराजापुरम येथे सेम्बियन महादेवी यांनी स्थापित केलेली मूर्ती निःसंशयपणे सर्वात मोहक आहे. चोल काळातील पुष्कळ कांस्य मूर्ती आता मंदिरे, संग्रहालये आणि खाजगी संग्रहात आहेत. एक महत्वाचा मुद्दा असा आहे की १४ व्या शतकानंतर त्रिपुरा-विजय कास्य मुर्ती बनवण्याचे प्रमाण कमी झाले कारण नंतरच्या काळात फारशा मुर्ती सापडत नाहीत. हे बहुधा नटराजाच्या मूर्तींना मिळालेल्या प्रचंड लोकप्रियतेमुळे असावे. त्रिपुरा-संहार ही संकल्पना नटराजाच्या संकल्पनेत विलीन झाली.
ब्रह्मोत्सवम नावाचा मोठा वार्षिक उत्सव शिवाच्या सर्व मंदिरांमध्ये अनेक दिवस साजरा केला जातो जो सहसा नऊ दिवस चालतो. यामध्ये भगवान शिवाची एक किंवा अधिक रूपांत मिरवणुक काढली जातात. अघोर-शिवाचार्य-पद्धती या प्रभावशाली ग्रंथात असे म्हटले आहे की वार्षिक उत्सवाच्या सहाव्या दिवशी त्रिपुरांतका मुर्तीची मिरवणुक काढली पाहिजे. सर्व वार्षिक उत्सवांमध्ये कर उत्सव, रथयात्रा यांचा समावेश होतो. ग्रंथांमध्ये आम्हाला कारचे सविस्तर वर्णन, आमंत्रण आणि उपासना दिली आहे. मंदिराच्या रथात सर्व आगम आणि पुराणात वर्णन केलेल्या त्रिपुरासुरांच्या मुर्तीची स्थापना केली जाते. काहीवेळा रथात बसवलेला मुर्ती नटराजाची असते आणि ती एक प्रकारे शिवाच्या विजय नृत्याचे प्रतिनिधित्व करतो.
प्राचीन काळापासून तामिळनाडूत साजरी केले जाणारे सण म्हणजे शिवाचे नृत्य आणि त्रिपुराचे दहन हे त्याच घटनेचा भाग आहेत. पूर्णानुरु आणि कालिटोकाई यांसारख्या संगम ग्रंथात या प्रकारांचा संदर्भ आहे. तीन शहरांचा नाश केल्यानंतर शिवाच्या नृत्याचे कवितेमध्ये सिलप्पाधिकारम् आकर्षक वर्णन करतात. या नृत्याला कोडुकोटी म्हणतात आणि शिवाने आपल्या रथाच्या आसनावर ते नृत्य केले होते.पार्वतीने ( जिचा उल्लेख भारती असा केला आहे ) देखील यावेळी शिवासोबत नृत्य केले आणि तिला पंडारंगा म्हणतात. तीन शहरांच्या विध्वंसाची कथेची लोकप्रियता तामिळनाडूमध्ये इ.स. पहिल्या शतकाच्या सुरुवातीपासूनची आहे.९ व्या शतकाच्या उत्तरार्धात बांधलेल्या प्रसिद्ध कोडुंबलूर मुवरकोइलमध्ये शिव धनुष्य धरून उत्स्फुर्तपणे नाचत असल्याचे विलोभनीय दगडी शिल्प आहे. १३ व्या शतकाच्या अखेरीस नटराजाची लोकप्रियता वाढल्यामुळे नंतरच्या शतकांमध्ये त्रिपुर विजयाच्या कांस्य मूर्तींच्या निर्मितीत घट झाली असावी
त्रिपुरांतक मुर्तीच्या आकलनाबाबतीत असलेल्या समस्या :-
त्रिपुरांतक कांस्य मुर्ती ओळखण्यासाठी पुरेशी साहित्य उपलब्ध असले तरी, त्या मुर्ती ओळखण्यासाठी अजूनही समस्या आहेत. जेथे त्रिपुरा-विजय प्रतिमेचा संदर्भ देणारे जुने शिलालेख आहेत आणि मंदिरात त्या काळातील कांस्य मुर्ती ( कोनेरीराजापुरममधील कास्य मुर्तीप्रमाणे ) आहे, तेथे या मुर्ती ओळखण्याबद्दल काही शंका नाही. मंदिराच्या परंपरा देखील मुर्ती ओळखण्यासाठी खूप उपयुक्त आहेत. साधारणपणे जिथे शिव आपल्या पत्नीसोबत धनुष्यबाणांसह दिसतो तिथे ओळखण्यास अडचण येत नाही. कळीचा मुद्दा म्हणजे समोरच्या डाव्या हाताने धनुष्य (सिंह-कर्ण मुद्रा) धारण केलेली मुद्रा जी मुर्ती ओळखण्यासाठी एक मुख्य संकेत आहे. मात्र एखादी मुर्तीमध्ये शिव त्याच्या पत्नीसोबत असताना गोंधळ उडतो, उदा. क्लीव्हलँड म्युझियममधील शिव मुर्ती हि प्रख्यात मुर्ती तज्ञ्ज क्रॅम्रिश यांनी चंद्रशेखर शिवाची मुर्ती म्हणून मानली आहे जी प्रत्यक्षात त्रिपुरांतक आहे.
त्रिपुरांतक की विणाधर ? :-
त्रिपुरांतक कांस्य मुर्तीला बर्याचदा विनाधारा दक्षिणामूर्ती समजले जाते. मात्र मुर्ती नेमकी ओळखण्यासाठी मुख्य मुद्दा म्हणजे समोरच्या डाव्या हाताची हाताची मुद्रा महत्वाची ठरते. त्रिपुरांतक या मुर्तीत डाव्या हातात धनुष्य धरले असते. वाकलेली बोटे धनुष्याला उभ्या स्थितीत पकडतात आणि या आसनाला धनुर-मुष्टी (धनुष्य चालवणे) म्हणतात. तर विणाधर शिव मुर्तीच्या बाबतीत, डाव्या हाताने वीणा वाद्य छाती जवळ धरले असते आणि बोटे तार वाजवण्यासाठी वळवलेली असतात. यास्थितीत हाताची मुद्रा पंचेचाळीस अंशात तिरकी किंवा क्षितिज संमातर असते आणि तांत्रिकदृष्ट्या त्याला कटक-मुद्रा म्हणतात. जर अशा मुद्रा स्पष्टपणे ओळखल्या गेल्या तर मुर्तीची ओळख सहजपणे करता येते परंतु जिथे हाताची स्थिती जर या दोन्ही मुद्रेच्या मध्येच असेल तिथे गोंधळ उडतो.
त्रिपुरांतक की किरात? :-
किरात आणि त्रिपुरांतक कास्य मुर्तींच्या बाबतीतही असाच गोंधळ निर्माण होण्याची शक्यता आहे. दोन्ही मूर्तींमध्ये शिवाने डाव्या हातात धनुष्य धरले आहे. दोन्ही पुतळ्यांमधील हातांची मुद्रा सारखीच आहे, त्यामुळे कोणती मुर्ती आहे याची ओळख पटवणे अवघड जाते. अनेक चोल काळातील शिल्पांमध्ये आणि कांस्य मुर्तीमध्ये ( मेलाप्परमपल्लम मुर्ती ) किरात हा शिकारी म्हणून दाखवला आहे, त्याचे शरीर सुदृढ , दाढी आणि कानात कुंडले आहे.त्याचे केस त्रिपुरारी रूपात दिसणाऱ्या जटा-मकुटाऐवजी अंबाडासारख्या गाठीत बांधलेले असतील (याला उष्णीष म्हणतात ). मुर्ती ओळखण्यामध्ये जो गोंधळ होतो त्याचे उत्तम उदाहरण म्हणजे प्रसिद्ध तिरुवेत्कलम (चिदंबरम जवळ) मुर्ती, ज्याची ओळख किरात म्हणून केली जाते.

त्रिपुरांतक शिव, कांची कैलासनाथर मंदिर, कांचीपुरम, तमिलनाडु
हम्पी येथील विरुपाक्ष मंदिरातील रंगमंडपातील त्रिपुरांतक शिवाचे भित्ति चित्र
हंपीतील विरुपाक्ष मंदीरातील छतावरील भित्तीचित्रात त्रिपुरांतक शिवाचे चित्रण केले आहे. यामध्ये चतुर्भुज शिव दाखवले आहेत, त्यांनी उजवा पाय पुढे आणि डावा पाय मागे उचललेला दाखवला आहे. डाव्या हातात धनुष्य घेउन उजव्या हाताने बाण ताणला आहे. भगवान शिवांनी निळ्या रंगाचे धोतर आणि नरमुंडाची माळ् घातली आहे. मागच्या बाजुला नागिण दाखवली आहे, तसेच मागे वरच्या बाजुला एक किन्नर घंटा वाजवताना दाखविला आहे. चंद्र आणि सुर्य रथाची चाके दाखवली आहेत. तीन वर्तुळात तीन शहरे दाखवली आहेत्, यातील तीन वर्तुळात दोन राक्षस दाखवली आहेत तर एका वर्तुळात सोन्याचे शहर नष्ट झालेले दाखवले आहे. या कथेत अशी एक मान्यता आहे कि जेव्हा महादेवांसमवेत सगळे देवांचे सैन्य निघाले तेव्हा त्यांच्या वजनाने रथाचे चाक वाळुत फसले, ते भगवान शिवांनी बाहेर काढले. त्यासाठी विष्णुंनी एका वेलीचे रुप धारण केले असे चित्रात दाखवले आहे. जेव्हा रथ बाहेर आला तेव्हा विष्णू पुन्हा आपल्या मुळ जागी म्हणजे बाणात जाउन बसले. अर्थात शिवांनी त्या तिन्ही भावांना पुर्ण नष्ट केले नाही, त्याचे असे मत होते कि ते तिघेही अहंकार आणि भ्रम झाल्यामुळे चुकीच्या मार्गाला लागले. जेव्हा त्या तिन्ही शहरांचा नाश करण्यासाठी भगवान शंकरांनी बाण सोडला तेव्हा त्यांच्या असे लक्षात आले कि त्या तीन नगरांपैकी एकात मय राक्षस रहात होता, जो मात्र धर्माच्या वाटेवर चालत होता. या बाणामुळे तो देखील नष्ट होईल हे लक्षात आल्यावर शिवांना वाईट वाटले, शिव उदास पाहून नंदीने त्यांना त्याचे कारण विचारले. त्याचे कारण लक्षात आल्यावर नंदीने चटकम मयासुराला सावधान केले आणि त्या नगरातून पळून जाउन जीव वाचवण्याचा सल्ला दिला. हि तीन पुरे नष्ट केल्यावर भगवान शिवांनी आपल्या कपाळावर भस्माचे तीन पट्टे ओढले असे मानले जाते. हे तीन भस्म पट्टे शैव पंथाचे प्रतीक आहेत. या घटनेनंतर शिवशंकरांना त्रिपुरांतक हि उपाधी मिळाली.
या कथेत एक विशेष गोष्ट आपल्याला पहायला मिळते. यापुर्वी त्रिपुरासुराचा वध भगवान शिवांचा पुत्र कार्तिकेयाने केला तर त्रिपुरासुराच्या मुलांचा वध कार्तिकेयाच्या पित्याने म्हणजे शिवशंकरांनी केला. वडील आणि मुलांच्या एकमेकांच्या शत्रुत्वाचे हे अनोखे उदाहरण म्हणावे लागेल. 
![]() |
![]() |
या कथेतील बारकावे शिल्पांत उतरवताना त्या प्रतिमेमागच्या आव्हानांची कल्पना आपल्याला येते. एखादे कथानक शिल्पबद्ध करताना अतिशय मर्यादित जागेत शिल्पांतील बारकावे दाखवावे लागतात. त्यामुळे अश्या मूर्तीमध्ये शिल्पकार त्याचे विशेष कौशल्य, त्याच्या कल्पकतेने मांडत असतो. अनेक शिल्पग्रंथांमध्ये अश्या मूर्तींच्या निर्माण विधीचाही उल्लेख येतो. वेरूळ येथील दशावतार लेणीतील त्रिपुरान्तक मूर्तीत सारथी साक्षात ब्रह्मदेव आणि घोडे रथ ओढताना शिल्पांकित केले आहेत. वेरूळच्या कैलास लेणीमध्ये त्रिपुरांतक शिवाचे अतिशय सुंदर शिल्प कोरलेले आहे. दक्षिण भारतामध्ये असे शिल्प मोठ्या प्रमाणात उपलब्ध असले तरी, वेरूळच्या कैलास लेणीतील त्रिपुरांतक मूर्ती ही वेगवान हालचाल करीत असलेली, अचूक शरसंधान, रथाची गतिमानता या सर्व बाबींचा बारकाईने विचार करून शिल्पकाराने हे शिल्प घडविले आहे. प्रस्तुत शिल्पात शिवाने दोन्ही पायात अंतर ठेवून रथावर उभे असून स्वतःचा तोल सांभाळीत असल्याचे सहज जाणवते. शिवाची उभी राहण्याची ढब, आकर्ण खेचलेली धनुष्याची दोरी, शिवाच्या हाती कोरलेले आयुधे सारे काही उत्कृष्टपणे कोरली आहेत. शरसंधान करीत असताना शिल्पात बाण दाखविलेला नाही. याचा अर्थ धनुष्यातून बाण निघालेला आहे. शिल्पातील घटनाक्रम पाहता बाणाने आपले काम अचूक केले असल्याचे जाणवते. धनुष्य ओढून नुकताच बाण सोडला आहे. ज्यामुळे तीन पैकी एक पूर उध्वस्त झाल्याचं शिल्पात दाखवताना धनुष्याच्या खाली आकाशातून एक व्यक्ती पडताना कोरलेला असून हा पहिला पूर, असुर किंवा किल्ला आहे. रथातील गतिमानता स्पष्ट करण्यासाठी घोडे आणि रथ हे काटकोनात असलेल्या भिंतीच्या कोपऱ्यात कोरून कलाकाराने हवे ते दृश्य साकार करण्यात यश मिळविले आहे.
बौद्ध धर्मातील मान्यतेनुसार, कार्तिकी पौर्णिमेच्या दिवशी तथागत बुद्धाचा एक शिष्य धम्म सेनापती सरीपुत्राचे परीनिर्वाण झाले होते. त्यामुळे बौद्ध उपासक आणि उपासिका अष्टशिलांचे पालन व उपवास तसेच बुध्द वंदना करतात. शीख धर्माचे संस्थापक गुरु नानक देव यांची जयंती कार्तिकी पौर्णिमेच्या दिवशी साजरी केली जाते. कांचीपुरम येथील कैलासनाथ मंदिरात शिव गुडघ्यावर बसून वरच्या दिशेने त्याच्या धनुष्याची प्रत्येंचा ताणलेला शिल्पित केला आहे. याशिवाय मध्य भारतामधील एका शिल्पांत शिवाचा पाय एका वाकलेल्या पुरुषावर स्थित आहे. म्हैसूर येथील त्रिपुरान्तक शिव पंचमुखी, गंगा डोक्यावर धारण केलेला दाखवलेला आहे. तीन दुर्ग आणि त्यातले दैत्य स्पष्ट दिसतायेत. बाणावर विष्णूचे अंकन आहे. चंद्र-सूर्य चाके असलेल्या रथाला चार घोडे आहेत ज्यांचा लगाम ब्रह्मदेवाच्या हातात आहे. शिवाय विनायक म्हणून गणेशही आहे असे दिसते. नंदी रथाला आधार देतो आहे. शेषनागरूपी प्रत्येंचा ताणून धरली आहे. एकूणच संपूर्ण सृष्टी आणि सर्व देवता या त्रिपुरांचा विनाश करण्याच्या कार्यात रुद्र शिवाला सहाय्य करताना अंकित केले आहेत.
रुद्र आणि दैत्य यांच्यातील युद्धाचा साक्षात्कार या शिल्पातून अनुभवता येतो. दुर्गांचा विनाश करण्यासाठी बाण सोडण्यपूर्वीचा तो एक क्षण त्या शिल्पांमध्ये गोठवला आहे. शिवाचे रुद्र रूप, त्याची पुरांवर स्थिरावलेली एकाग्र नजर आणि त्यातून त्या शिल्पांत निर्माण झालेल्या एका प्रचंड नाट्याची कल्पना आपल्याला येते. एकूणच त्या त्रिपुरारीच्या अद्भुत शक्तीची अनुभूती या शिल्पातून साकार होते आणि स्वाभाविक भक्ताच्या मनात त्रिपुरान्तकाय नमः च्या लहरी उत्पन्न होतात.
पण कथा इथेच संपत नाही. खरं तर हे फक्त एक उदाहरण आहे. शेवटी ब्रह्मदेव स्वतःच इतर देवांना सांगतात. "राक्षसांनी लिंगाची पूजा करणे बंद केले आणि त्यांना शिक्षा झाली. विष्णू, मी आणि तुम्ही सर्वांनी पाशुपत व्रताचे पालन केले आणि लिंगाची पूजा केली आणि त्यामुळे आम्ही दुःखांपासून मुक्त झालो. सर्व प्राणिमात्रांनी पाशुपत व्रताचे पालन केले पाहिजे, लिंगाची पूजा केली पाहिजे आणि मुक्ती मिळवली पाहिजे." त्रिपुरांतक कथेचा मुख्य उद्देश पाशुपत पंथाची महानता आणि लिंगाच्या रूपात शिवाची पूजा करण्याचा प्रचार करणे हे आहे.
लिंगमूर्तीची पूजा कशी करावी? याचे वर्णन ब्रह्माजींनीच शेवटी केले आहे. "पशुपत व्रत म्हणजे एखाद्याने आपले मन आणि कृती आणि विचारात (कर्मेंद्रिये, ज्ञानेंद्रिये, मन, बुद्धी, अहंकार आणि चित्त यांना शिस्त लावणे) शुद्ध केले पाहिजे. जी व्यक्ती आपल्या शरीरावर पवित्र भस्म लावते आणि मनाने पशुपतीशी एकरूप होण्यास तयार असेल तर त्याला पाशुपत योग म्हणतात. यामुळे भाविकांना रुद्राची प्राप्ती होईल, शिवाची उपासना करणे आणि शिव बनणे, हीच खरी उपासना.
त्रिपुरांतक मंदीरे :-
त्रिपुरांतक मुर्ती आणि मंदीरे भारतात काही ठिकाणी आहेत. चिंदबरमजवळ तिरुवाटीकाईमध्ये असलेल्या वीरत्तेश्वर मंदीर. हे मंदीर आठ वीर स्थळामध्ये गणले जाते. वीर स्थळामध्ये शिव वाईट शक्तीचे विनाशक मानले जातात. याशिवाय चेन्नईजवळ तिरुविरकोलम इथेही त्रिपुरांतक मुर्ती आहे.
त्रिपुरांतक मंदीर , शिवमोगा :-
कर्नाटकातील शिवमोगा येथे इ.स. १०७० मधील पश्चिमी चालुक्य घराण्याचा राजा विष्णुवर्धन याने निर्माण केलेले त्रिपुरांतक मंदीर आहे. या काळात चालुक्य राजवट एन भरात होती. पश्चिमी चालुक्य हे घराणे शिवभक्त होते. त्यांनी भगवान शिवशंकरांची अनेक मंदीरे बांधली. त्यापैकी एक म्हणजे त्रिपुरांतक मंदीर.

शिवमोगा येथील त्रिपुरांतक मंदीरातील शिव मुर्ती
या मंदीराच्या प्रवेशद्वारावरच विष्णु आणि ब्रम्हदेवाची मुर्ती आहे. हे पुर्ण मंदीर पश्चिमी चालुक्य शैलीत बनवले गेले आहे. या शैलीचा प्रभाव मंदीराच्या आतील आणि बाह्यभागावर स्पष्ट दिसतो. मुख्य मंदीराच्या समोर आणखी दोन उप मंदीर बांधली आहेत. मंदीराच्या मंडोवरावर कामशिल्प आहेत, जे चालुक्य शैलीचे वैशिष्ट्य आहे. मंदीराच्या खिडक्या किंवा जाल वातायने विशेष लक्षवेधी आहेत. याचे कोरीवकाम अत्यंत नाजुक पध्दतीने केलेले आहे. मंदीरतील कोरीव स्तंभ, द्दरवाज्याच्या चौकटी या हळेबिडू आणि बेलुर येथील मंदीराची आठवण करुन देतात. मंदीरावर मोठ्या प्रमाणात शिल्पपट आहेत. त्यात नागशिल्प विशेष लक्षवेधी आहेत.

नाजुक कलाकुसर केलेले त्रिपुरांतक मंदीराची जालवातायने ( खिडक्या )
मंदीराच्या दरवाज्यावर कोरलेल्या द्वारपालांच्या मुर्ती या मंदीराच्या मुख्य देवतेच्या रक्षक असतात, असे मानले जातात. मंदीराच्या प्रवेशद्वारावरच शिव आणि गजासुरवधाच्या अनेक मुर्ती दिसून येतात. उजवीकडे ब्रम्हदेव, गणेश आणि कार्तिकेयाच्या मुर्ती आहेत. होयसाळ वंंशाशी संबधीत खुप मुर्ती येथे पहायला मिळतात. उत्तम उदाहरण म्हणजे होयसाळ राजाने सिंहाची केलेली शिकार. याच शिकारीचे वर्णन करणारे अनेक शिलालेख मंदीराच्या परिसरात बघायला मिळतात.
मस्य संहारक मुर्ती :-
भगवान शिवांचे हे एक अगळे रुप मानायला हवे. या अवतारात भगवान विष्णूंनी धारण केलेल्या मस्त्य अवताराला शांत करण्यासाठी शिवाने हा मस्त्य संहारक अवतार धारण केला. प्राचीन काळी सोमुगासुर नावाचा राक्षस तपश्चर्या करत होता. त्याला ताकदवान होण्यासाठी भगवान शिवांकडून वरदान हवे होते. तिन्ही लोकांमध्ये कोणाकडूनही मृत्यु न होण्याचे वरदान सोमुगासुराका भगवान शंकराकडून मिळाले. आता आपण अवध्य झालो या कल्पनेने त्याला अहंकार निर्माण झाला आणि तो ब्रह्मदेवाच्या जवळ गेला आणि त्यांच्याकडून चारही वेद हिसकावून समुद्रात गायब झाला. यामुळे ब्रह्मदेवाना चिंता निर्माण झाली आणि यातून मार्ग काढण्यासाठी ते भगवान विष्णुंकडे म्हणजे तिरुमल (विष्णू) यांच्याकडे जाउन झाला प्रकार सांगितला. सोमुगासुराचा वध करुन पुन्हा वेद प्राप्त करण्यासाठी तिरुमलनी एका मोठ्या माशाचे रूप धारण केले. मस्त्य रुपात खोल समुद्राच्या आत गेले आणि सोमुगासुराच्या शोधात समुद्रमंथन केले. मग समुद्रात लपलेल्या असुरांला शोधून काढले आणि त्याच्याशी युध्द करून त्याला ठार मारला. विष्णूंनी त्याने ब्रम्हदेवांकडून हिसकावलेले सर्व वेद त्याच्याकडून परत घेतले आणि ब्रह्मदेवाना परत दिले. मात्र सोमुगासुरांच्या शरीरातून बाहेर पडलेल्या रक्ताने संपूर्ण समुद्र लाल झाला. विष्णुंचे अवतार घेण्याचे कार्य संपल्यावर त्यांनी मत्स्यावतार संपवणे अपेक्षित होते. मात्र सोमुगासुर वधानंतर ही एखाद्या पर्वताच्या आकाराच्या मस्त्याने आपले शरीर समुद्राच्या चारही बाजूंनी पसरून समुद्रातच पोहत राहिला. त्याने समुद्रात उरलेले सर्व मासे नष्ट करून मारले. त्याने समुद्रात राहणारा एकही प्राणी सोडला नाही. यामुळे त्रिलोकात खळबळ उडाली आणि ही बातमी भगवान शंकराच्या कानावर पोहोचली. भगवान शिवांनी यावर उपाय म्हणुन मच्छिमाराचे रूप धारण केले आणि मासेमारीचे जाळे घेऊन समुद्रात गेले. त्यानीही त्या मोठ्या माशासारखा मोठा आकार घेतला. मासेमारीचे जाळे समुद्रात टाकून त्यांनी तो मोठा मासा पकडला. मग त्यांनी त्याचा डोळा उपटून आपल्या अंगठीत बसवला. डोळे गमावल्यानंतर, मोठ्या माशाचे रूप धारण करणाऱ्या तिरुमलांनी भगवान शिवांना त्याचे मूळ रूप परत देण्याची विनंती केली .मोठ्या माशांचे रुप धारण करणार्या भगवान विष्णुंच्या विनंतीवरून भगवान शिवानी मच्छ संहारमूर्तीचे रूप घेतले आणि विष्णुंना त्यांचे मुळ रुप परत दिले आणि त्यांना आशीर्वाद दिला. कांचीपुरम येथील मंदिरात या मूर्तीची पूजा केली जाते. तेथील एका खांबावर हे रूप कोरले आहे. शिवांच्या या रुपाची पुजा बेलाच्या पानांने केली जाते, नैवेद्य म्हणून चिंच- भात (पुलियोदराई) अर्पण केला जातो. दर मंगळवारी तिळाच्या तेलाने दिवा लावला जातो. या रुपाची आराधना केल्यामुळे व्यवसायात अधिक सुधारणा होते आणि नवीन उपक्रम सुरू करताना फायदा होतो.
या कथेचे आणखी एक रुप म्हणजे मत्स्यावतारात भगवान विष्णूनी कार्य संपल्यावर भुलोक हा मृत्युलोक असल्यामुळे मत्स्य अवताराचा शेवट करणे आवश्यक असताना अवतार न संपवल्याने या अवताराचा शेवट करण्यासाठी मत्स्य संहारक अवतार धारण करण्याचे ठरवले. माशाचा नाश करायचा तर त्याचा शत्रु म्हणून बगळ्याचा रुप घेतले आणि चोचीत मत्स्य अवतार धारण केलेल्या विष्णूंना पकडले आणि त्यावर विष्णुंना आपली चुक समजली आणि त्यांनी भगवान शिवांची स्तुती केली. हेच रुप वरील शिल्पात कोरले आहे.
इथे एक देव दुसऱ्या देवाला शांत करण्यासाठी आवश्यक ते रुप घेतो आहे, ही कल्पना फारच थक्क करणारी आहे. असाच प्रसंग रामायणात बघायला मिळते. रामायणात असा प्रसंग आहे की सीतास्वयंवर प्रसंगी श्रीरामांनी शिवाचे धनुष्य तोडले होते म्हणुन परशुराम रागावले होते आणि रामाचा सामना करण्यासाठी विवाहस्थळी आले होते, मात्र नंतर त्यांना श्रीरामांनी स्वतः शांत केले होते, विशेष म्हणजे दोघेही विष्णूचे अवतार आहेत. दुसऱ्या कथेत, माँ कालीने असुराचा वध केल्यावर कोपिष्ट झाली होती, तीला शांत करण्यासाठी भगवान शिव तिच्यासमोर एखाद्या शवासारखे झोपून राहीले. दोन्ही कथांमध्ये, जरी दोन वेगळे अवतार असले तरी हि दोन्ही रुपे एकाच देवाचे अस्तित्वाचे मूर्त स्वरूप आहे असे दिसते (राम आणि परशुराम एकच आहेत, कारण ते एकाच देवाचे म्हणजे विष्णूचे अवतार आहेत, किंवा शिव आणि शक्ती एकच परमेश्वराची रुपे आहेत ).
अर्थात या कथेत समस्या ही आहे की यामध्ये दोन वेगळ्या देवांचा आणि पर्यायाने पंथीयांचा संदर्भ आहे तो म्हणजे हर आणि हरी म्हणजेच शैव आणि वैष्णव आणि इथे असा प्रश्न पडतो की, "हे शैव आणि वैष्णव यांच्यातील आंतर-पंथीय वादापैकी एक आहे का?" याचे उत्तर हो किंवा नाही असे असेलही. परंतु, जर आपण "शिवस्य हृदयम् विष्णुहु, विष्णोर हृदयम् शिवा" या तत्वाचा किंवा "त्वं ब्रह्म त्वम् विष्णु त्वम् रुद्र त्वम् प्रजापतिही" या तत्वाचा विचार केला तर दोन्ही विधानांचा अर्थ असा होतो की, आपण एकाच देवा देवाची अनेक रुपे पहात आहोत.
अशीच कथा भगवान विष्णुंच्या नरसिंह अवतारासंदर्भात येते. जेव्हा नरसिंहाने हिरण्यकश्यपुचा वध केल्यावर संतापाने नरसिंह अनावर झाला आणि तिन्ही लोक त्यामुळे भयभीत झाले. कोणीतरी नरसिंहाला आवरणे आवश्यक होते. नरसिंह कसे शांत झाले याच्या काही शक्यता सांगितल्या जातात.
१) हिरण्यकश्यपुच्या वधानंतर प्रल्हादाची विनंती ऐकून नरसिंह स्वतःहून शांत झाला.
२) नरसिंहाला भगवान शिवांनी निर्माण केलेल्या शरभाने शांत केले.
३) नरसिंहाला शरभाने निर्माण केलेल्या प्रत्यांगिरा देवीने शांत केले.
वरील तीन शक्यतेपैकी पहिल्या शक्यतेमध्ये भगवान विष्णुंनी स्वतःच स्वतःला शांत केले आहे. दुसर्या आणि तिसर्या शक्यतेमध्ये मात्र इतर शक्तीने विष्णुंना शांत केले असे सांगितले आहे. इथे प्रश्न असा निर्माण होतो कि विष्णुना शांत होण्यासाठी शिवांची का आवश्यकता पडली ? कारण इतर अवतारात विष्णुंनी आपले पृथ्वीवरचे कार्य संपल्यावर स्वतःच आपला अवतार संपवलेला दिसतो. अर्थात या प्रश्नांची उत्तरे मिळणे कठीण आहे.

कुर्म संहारक मुर्ती :-
एकेकाळी देव आणि दानव यांचे एकमेकांशी सतत युध्द होत होते. त्यामुळे दोन्ही बाजूंचे नुकसान झाले आणि बरीच जीवितहानी झाली आहे. म्हणून देव ब्रह्मदेवाकडे गेले आणि त्यांना सुचवले की क्षीरसागराचे मंथन करून जे अमृत बाहेर पडेल त्याचे प्राशन करुन ते दीर्घायुषी होऊ शकतात. भगवान ब्रह्मदेवाने हे महाविष्णूंना सांगितले आणि त्यांच्या मदतीने क्षीरसागराचे मंथन करण्याचे ठरवले. मात्र सागराचे मंथन करण्यासाठी वापरलेला मंदार पर्वत स्थिर न राहू शकल्याने अतिशय जोराने हलू लागला. म्हणून भगवान विष्णु पर्वताच्या तळाशी गेले, आणि त्यांनी कासवाचे रूप धारण केले आणि पर्वताला तोलून धरले.त्यामुळे समुद्र मंथन करणे शक्य झाले. मंथनाच्या सुरवातीलाच क्षीरसागरातून हलाहल विष बाहेर पडले आणि भगवान शिवांनी ते विष प्राशन केले. इथपर्यंतची ही कथा आपल्या सर्वांना माहीत आहे. हलाहल विषाच्या उत्पत्तीचे कारण म्हणजे या मंथानाच्या वेळी भगवान शंकराची उपेक्षा करणे आणि त्यांची पूजा न करणे. म्हणून सर्वांनी भगवान शंकराची पूजा केली. आता महाविष्णूनी पुन्हा एकदा कुर्म म्हणजे कासवाच्या रुपात पर्वत तोलून धरला. क्षीरसागरातून अनेक दुर्मिळ वस्तू बाहेर आल्या. सरते शेवटी जेव्हा अमृत बाहेर आले तेव्हा अमृताचा कुंभ ताब्यात घेण्यावरुन देव आणि दानवात वाद सुरु झाला.मग विष्णुंनी मोहिनी नावाच्या मोहक स्त्रीचे रूप धारण केले आणि राक्षसांना फसवून ते अमृत फक्त देवांना दिले. मात्र हि फसवणुक दोन राक्षसांनी समजली,त्यांनी देवांचे रूप धारण केले आणि अमृत प्याले. या दोन राक्षसांचे हे कृत्य पाहणाऱ्या सूर्य आणि चंद्राने ही बाब विष्णुंना कळवली. रागावलेल्या विष्णूंनी त्यांच्या हातात असलेल्या खडगाच्या सहाय्याने या दोन्ही राक्षसांचे म्हणजे राहु व केतुचे दोन तुकडे केले.मात्र राहु, केतु यांनी जे अमृत प्यायले त्यामुळे ते मरण पावले नाहीत. या दोघांनी शिवपूजा केली आणि राहू आणि केतु हे ग्रह म्हणून अमर झाले. आजपर्यंत ते त्यांचे शत्रू असलेल्या सूर्य आणि चंद्राला त्रास देत आहेत. मात्र हे मंथन संपले आणि कासवाच्या रूपात मंदार पर्वताला धारण करुन उभे राहिलेल्या विष्णुंनी सर्व सात समुद्र एकत्र केले आणि या सात महासागरांच्या पाण्याच्या प्रवाहाने जगाला हलवून सोडले. मग कुर्म अवताराने समुद्रात सापडलेल्या सर्व सजीवांना खाल्ले. तरीही त्याची भूक संपली नाही. त्यामुळे ते समुद्राचे पाणी प्यायले. यामुळे सूर्य आणि चंद्र घाबरले आणि त्यांनी महासागरात अदृश्य होण्यास नकार दिला आणि स्वतःला कोठेतरी लपवले. संपूर्ण जग अंधकारमय झाले. या अपरीस्थितीतून वाचण्यासाठी देवांसह संपूर्ण मानवजातीने भगवान शिवाजवळ जाऊन त्यांचे संरक्षण मागितले. त्यांना कुर्म अवतार संपवण्यास सांगितले. तत्काळ भगवान शिवाने आपल्या त्रिशूळाच्या साहाय्याने त्याचे शरीर फाडले आणि त्यातून संपूर्ण मांस बाहेर काढले. त्यांनी विष्णुच्या इच्छेनुसार (कुर्म अवताराला ) गळ्यातील (भगवान ब्रह्मदेवाच्या मस्तकापासून बनविलेल्या ) माळेत मध्यभागी कवच रत्न म्हणून घातले. या सर्व घटनेमुळे विष्णुंना वाईट वाटले आणि त्याने भगवान शिवाची क्षमा मागितली. कासवाचा वध केल्याने भगवान शिवाला कूर्म संहारमूर्ती हे नाव पडले.
चेन्नईतील पॅरी भागात असलेल्या कच्छलीश्वर मंदिरात या घटनेचे चित्र रंगवले आहे. त्या मंदिरात अनेक शिवमूर्तींची चित्रे पाहायला मिळतात. दर सोमवारी इथे बिल्व अर्चना आणि सरकाराय पोंगल नैवेद्यम् अर्पण केले जातात.जर अश्या प्रकारे पुजा एखाद्या व्यक्तीने केली तर त्याला पाण्याने कोणताही धोका रहात नाही किंवा आयुष्यातील संकट आणि भीती दूर होते असे मानले जाते. तसेच एखाद्या जोडप्याने हि आराधना केल्यास ते सदैव एकत्र राहतील अशी मान्यता आहे.

वराह संहार मूर्ति: -
प्राचीन काळी हिरण्यक्षण नावाचा राक्षस ब्रह्मदेवाची तपश्चर्या केली. ब्रह्मदेवाने त्याला मागितलेले सर्व वरदान दिले. मात्र त्यामुळे उन्मत्त होउन हिरण्याक्षाने पृथ्वी ताब्यात घेतली आणि तो समुद्रात अदृष्य झाला. यामुळे सर्वत्र हाहाकार पसरला. सर्व देव चिंतीत झाले. ते सर्व तिरुमल (विष्णू) यांच्याकडे गेले आणि त्यांना यापरिस्थितीत मार्ग काढण्याचे आवाहन केले. सर्वांच्या आग्रहाने भगवान विष्णुनी हिरण्याक्षापासून पृथ्वी मुक्त करण्याचे ठरवले आणि गरुडावर स्वार होउन त्यांनी वैकुंठातून प्रस्थान केले. वैकुंठ ओलांडल्यानंतर त्यानी वराहाचे (डुकराचे) रूप धारण केले. वराहाची उंची मेरु पर्वता पेक्षा जास्त होती, त्याच्या प्रत्येक चार पायांमधील अंतर कित्येक योजना होते, शेपटीची हालचाल अशी होती कि ती आठही दिशांना स्पर्श करत होती आणि त्याने श्वास सोडलेल्या उच्छ्वासाने संपूर्ण विश्व उष्ण होत होते. असे भयंकर रुप धारण करुन त्यांनी समुद्राला घुसळून हिरण्याक्ष राक्षस कोठे लपला आहे ते शोधले. वरहरुपी विष्णूंनी हिरण्याक्षाला आपल्या सुळ्यांनी ठार केले आणि पृत्वीला आपल्या सुळ्यावर धारण करुन पुन्हा तीच्या कक्षेत प्रस्थापित केले. तिन्ही लोकांनी सुटकेचा निश्वास सोडला.
मात्र वराह अवताराचे कार्य संपले तरी विष्णुंनी वराह देह सोडला नाही. त्यातच राक्षसाला ठार मारताना जी उत्तेजना निर्माण झाली होती, त्यामुळे वराह बेभान झाला. त्याने वाटेत आलेल्या सर्व प्राण्यांना मारले. त्याचा छळ वाढतच चालला आणि असह्य होत गेल्याने, देवांनी भगवान शिवाजवळ जाऊन प्रार्थना केली आणि त्याला वराहापासून मुक्ती देण्याचे आवाहन केले. त्यांचे दुःख दूर करण्याचे मान्य करून, भगवान शिवानी शिकार्याचे रूप धारण केले आणि आपल्या त्रिशूळाने वराहावर वार केला. त्यानी त्याचा सुळा तोडला आणि आपल्या माळेत रत्न म्हणून घातला. या कृत्यामुळे वराह्मचा अहंकार नाहीसा झाला आणि त्याने भगवान शिवाची क्षमा मागितली. त्याच्या दोन सुळ्यापैकी एक सुळा तुटलेला होता. नंतर भगवान शिवाच्या आशीर्वादाने त्यांना त्यांचे मूळ स्वरूप प्राप्त झाले आणि वराह पुराणाचे कथन करून ते वैकुंठाला पोहोचले. देवांचे दुख दूर करण्यासाठी, वराह्माचा वध करण्यासाठी भगवान शिवाने घेतलेल्या अवताराला वराह संहार मूर्ति म्हणतात. या मुर्ती काशीमध्ये आणि तामिळनाडूमधील पज्जमलाई मंदिरात बघता येतात. या मुर्तींना बुधवारच्या दिवशी तुपाचा दिवा लावून आणि नैवेद्य म्हणून स्वत्व तांदूळ अर्पण केल्याने व्यवसायात भरभराट होते अशी समजुत आहे.
निसर्ग संपन्न तांबलडेग
निसर्गसंपन्न तांबळडेग
मित्राने, त्याच्या गावाला ’विठ्ठल रखुमाई’ चा सप्ताह असल्याने येतोस काय? अशी विचारणा केली. मी कोकणात जाण्यास कधीच नाही म्हणत नसल्याने लगेच तयारी करुन निघालो. कोकणातील ’देवगड’ जवळील ’मिठबांव’ गावाच्या बाजुला असलेल्या ’तांबळडेग’ या गावी पोहचलो.तांबळडेग गावाला निसर्गाचा वरदहस्त लाभलेला आहे. तांबलडेगच्या पश्चिमेला अरबी समुद्र व पूर्वेला खाडी असल्याने समुद्र व खाडीच्या मिलापाने सुंदर सौंदर्य प्राप्त झाले आहे. तांबळडेग हे देवगड तालुक्यातील समुद्र आणि खाडी यांच्या मधोमध वसलेलं एक छोटंसं गाव आहे. महादेवाचे दर्शन घेऊन गावात प्रवेश करावा लागतो. गावात जागोजागी आमराई व नारळाच्या बागातून लपलेली कौलारु घरं दिसत होती.घराला लागून असलेल्या वाडीत कामे करणारी माणसं दिसत होती.
सिंधुदुर्गातील सर्वोत्तम समुद्रकिनाऱ्यांपैकी एक म्हणून तांबळडेग किनाऱ्याचा उल्लेख करावा लागेल. तांबळडेग या गावाला प्रशस्त आणि स्वच्छ असा सुमारे ४ कि.मी. लाबींचा समुद्र किनारा लाभलेला आहे. अतीशय निसर्गरम्य असा येथील परिसर, एका बाजुला निळाशार समुद्र व त्याला जोडुन सोनेरी वाळूची किनार आणि त्याला साजेसे हिरवेगार सुरुचे बन हे दृश्य पाहिल्यावर असे वाटते जणु परमेश्वराने आपल्या मुक्त हस्ताने कुंचल्यातून चित्र साकारावे अशी तांबळडेगची निर्मिती केली असावी. तांबळडेग चा समुद्र किनारा स्वच्छ व सुंदर असल्याने आपण त्याच्या प्रेमात पडतो.
समुद्र किनारी जीवशास्त्रज्ञांना आकर्षित करणारे विविध जीव व शैवाल, शंख-शिंपले सापडतात. निरनिराळ्या असंख्य पक्षांचा विहार सुरु असतो. समुद्रात मच्छिमारी नौका लांबवर दिसतात.अशा सुंदर समुद्रकिनारी समुद्राच्या लाटा अंगावर घेण्याचा आंनद लुटता येतो.या किना-यावरील शांतता, रमणीयता आणि भव्यता मोहीत करणारी आहे. जलविहार आणि जलक्रीडा करण्यासाठी हा समुद्र किनारा सुरक्षित समजला जातो. या किना-यावर समुद्र गरूड, सी-गल असे पक्षी तर डॉल्फीन सारखे मासे पहायला मिळतात.गावात मासेमारी करुन आणलेली मासळी देवगड बाजारात जाते.तेव्हा गावाच्या पुर्वेला असलेल्या खाडीचा मासेमारी करीता चांगला उपयोग होतो.
समुद्र किना-याला लागुनच असलेल्या डोंगराच्या कुशीत माता ’गजबा’ देवीचे मंदिर आहे या मंदिराकडुन सुर्यास्त पाहाणे म्हणजे एक प्रकारची पर्वणीच म्हणावी लागेल. तसेच माता गजबा देवी एक जागृत देवी असून त्याची अनुभूती येथे आल्यावर मिळते. माता गजबादेवी मंदिरापासून समुद्र किना-याचे आणि या परिसराचे दृश्य अप्रतिम आणि मोहक दिसते. मंत्रमुगध करणारा हा परिसर प्रसिध्दीविना दुर्लक्षित राहिला आहे. त्यामुळे तेथे पर्यटकांची म्हणावी तेवढी गर्दी नसते.
देवगड तालुक्यातील समुद्रकासवाचे माहेरघर म्हणून प्रसिद्ध असणाऱ्या तांबळडेग. तांबळडेगचा किनारा ऑलिव्ह रिडलेची या प्रजातीच्या कासवांसाठी उपयुक्त आहे.ऑलिव्ह रिडले या जातीच्या कासवांना जीवदान देण्यात येथील ग्रामस्थांनी मोठी भूमिका बजावली आहे. येथील नागरिक दरवर्षी कासवांच्या अंड्यांचे संवर्धन करुन शेकडो कासवे येथून समुद्रात सोडतात.
तांबळडेग नगरीत सात दिवस विठू माऊली प्रगट झाल्याचे चित्र पहायला मिळाले.संपूर्ण गाव भक्तीमय झालेला असतो.मुंबईहून
बरीच मंडळी या सप्ताहाला आवर्जून येतात. नेत्रदीपक श्री विठ्ठल रखुमाई मूर्ती, कलाकुसर असलेले मंदिर, आकर्षक विद्युत रोषणाई, भजन असा सोहळा पहायला मिळतो. रात्री दिंडीच्या कार्यक्रमाला गावातील सर्व मंडळी जमतात.
तांबळडेग समुद्रकिनारी चांदण्या रात्री फिरण्यास वेगळाच आंनद मिळतो. समुद्राची गाज ऐकत थंड हवेचा गारवा झेलत वाळूच्या किनारी फिरण्याचा अनुभव आंनद देतो. वेगवेगळी ताजी मच्छी खाण्याचा आंनद घेता येतो.
देवगड तालुक्यातील कुणकेश्वर मंदिर, कुणकेश्वर बीच, आदी प्रमुख पर्यटनस्थळांना भेटी देण्यासाठी पर्यटक कोकणात येतात. तांबळडेग गाव सागरी महामार्गापासून थोडेसे आत असल्याने पर्यटकांना याची फारशी माहिती नाही. परंतु येथे एकदा आलेले पर्यटक पुन्हा पुन्हा या गावी आवर्जून येतात. तांबळडेग म्हणजे देवगड तालुक्यात दडलेले एक रत्न असून प्रत्येकाने एकदातरी येथे निश्चित भेट द्यावी.
सित्तनवासल इथलं गुहामंदिरं
- अभिजित कांबळे, ab2oct@gmail.com
जगभरात विविध ठिकाणी प्रागैतिहासिक गुहा पाहायला मिळतात. तशाच गुहा भारतातल्या विविध भागांत म्हणजेच - आझमगढ, बिल्लासुरगम, भीमबेटका, बाघ, सिंगनपूर, होशंगाबाद, बुंदेलखंड, मिर्झापूर इत्यादी ठिकाणी सापडलेल्या आहेत. दक्षिण भारतात तामिळनाडू राज्यातल्या सित्तनवासल इथं प्राचीन गुहामंदिरं आणि चित्रं सापडलेली आहेत. ही चित्रं म्हणजे भारतीय चित्रकलेचा पाया असू शकतात. अजिंठा शैलीचा प्रभाव असणारी ही चित्रं फ्रेस्को-पेंटिंग आहेत.
तामिळनाडूतल्या पदुकोट्टईच्या वायव्येला १६ किलोमीटरवर वसलेलं सित्तनवासल हे ठिकाण जैन आचार्यांचं इसवीसनपूर्व दुसऱ्या शतकापासून ते इसवीसनाच्या नवव्या शतकापर्यंतचं उपासनास्थान होतं. या परिसरात नर्तमले, मलैयडीपट्टी इत्यादी अन्य स्थानं आहेत. या प्राचीन गुहामंदिराचा शोध प्राध्यापक जोव्हाऊ डुब्रेल या पुरातत्त्वज्ञानं १९२० मध्ये लावला.
सित्तनवसाल हे ठिकाण ‘रॉक कट जैन गुफा’मंदिरातल्या ‘फ्रेस्को’चित्रांसाठी जगप्रसिद्ध आहे. तामिळनाडूच्या इतिहासात सित्तनवासलला अत्यंत महत्त्वाचं स्थान आहे. दगडी वर्तुळं, दफनस्थळं यांसारखी मेगालिथिक्स स्मारकं या भागात आढळतात. त्यामुळं इथं प्रागैतिहासिक मानवाची वस्ती होती याची साक्ष मिळते. इथं दोनशे फूट उंचीची एक खडकाळ टेकडी असून ती उत्तरेकडून दक्षिणेकडे आहे.
या खडकाळ टेकडीवर आणि आजूबाजूला चार स्मारकं आहेत. या टेकडीच्या पश्चिमेला प्रसिद्ध जैन गुहामंदिर आहे. ज्याला ‘अर्हतचं मंदिर’ असं नाव आहे. इथं इसवीसनाच्या नवव्या शतकातल्या चित्रांचे अवशेष आहेत. अजिंठाचित्रांनंतर ही चित्रं महत्त्वाची समजली जातात.
पूर्वेकडं ‘एझादीपट्टम’ नावाची नैसर्गिक गुहा आहे. तीमध्ये ‘पॉलिश रॉक बेड’ आहेत. जैन तपस्वी इथं कठोर तपश्चर्या करत असत. तिथं पहिल्या शतकातला ब्राह्मी शिलालेख व असंख्य तमिळ लेख उपलब्ध झालेले आहेत.
डॉ. ए. एकंबरनाथन आणि डॉ. सी. के. शिवप्रकाशम् यांनी त्यांच्या ‘जैन इन्स्क्रिप्शन इन तमिळनाडू’ (१९८७) या पुस्तकात, गुहेच्या दक्षिणेकडच्या खडकावर सातव्या व नवव्या शतकातले सात वेगवेगळे तमिळ लेख असल्याचं नमूद केलं आहे. गुहेतली शिल्पकला अतुलनीय आहे.
चित्रं अभ्यासण्याजोगी आहेत. शिल्पांसह संपूर्ण मंदिर प्लास्टरनं झाकलेलं आहे आणि रंगवलेलं आहे. मंदिराच्या छतावर खांबांच्या वरच्या भागावर आणि तळावर चित्रं आढळतात. ती आता काळानुसार क्वचित् दिसत नाहीत किंवा नष्ट होत चाललेली आहेत. समोरचा व्हरांडा ओलांडला की आयताकृती ‘अर्धमंडपम्’मध्ये प्रवेश करता येतो. हा अर्धमंडप गर्भगृहापेक्षा किंचित उंच आहे.
त्याच्या दर्शनी भागात मध्यभागी दोन मोठे खांब आणि दोन्ही टोकांना एक असे दोन खांब आहेत. खांब दोन्ही टोकांना चौकोनी आणि मध्यभागी अष्टकोनी आहेत. खांब आणि खांबांच्या वरचा खडक एका मोठ्या तुळईच्या स्वरूपात कोरलेला आहे. अर्धमंडपाच्या उत्तरेकडच्या आणि दक्षिणेकडच्या भिंतींवर कोनाडे आहेत.
दक्षिणेकडच्या देवळीमध्ये उत्थित खोदलेली बैठकावस्थेतली पार्श्वनाथ यांची मूर्ती आहे. तीखाली कोरीव लेख असून त्यात पार्श्वनाथ यांचा उल्लेख ‘लोक-आदित्य’ असा केलेला आहे. उत्तरेकडच्या देवळीत ध्यानावस्थेत जैन आचार्यांची प्रतिमा असून शेजारच्या स्तंभावर लेख कोरलेला आहे. या लेखात ‘श्रीआचार्य’ असा उल्लेख आहे. दोन्ही लेख नवव्या शतकातले आहेत. मागच्या भिंतीवर तीन मूर्ती आहेत. त्या जैन आचार्यांच्या असाव्यात. त्यांच्या डोक्यावर छत्री आहे.
त्याशिवाय मंडपाच्या दर्शनी भागातल्या दक्षिण कोपऱ्यात खोदलेला सतरा ओळींचा तमिळ लेख आहे. पांड्यवंशातला राजा श्रीमार श्रीवल्लभ व जैन आचार्य इलान गौतम यांनी या गुहामंदिराची दुरुस्ती केल्याचा, तसंच मंडपाची पुनर्बांधणी आणि सुशोभीकरण केल्याचा उल्लेख त्या लेखात आहे. त्यामुळे काही तज्ज्ञांच्या मते, या गुहामंदिराच्या निर्मितीचं श्रेय पांड्य राजांना आहे.
या गुहामंदिरात अजिंठ्याप्रमाणे सर्वत्र चित्रं रेखाटण्याची योजना असावी. भिंतीवरच्या गिलाव्यावरून व अवशेषांवरून तसं आढळतं. व्हरांड्यामधलं चित्र नयनरम्य असून त्यात कमळाची पानं, फुलं, मासे, हंस, बदकं इत्यादी घटक दिसतात. याशिवाय, काही पक्षी व फुलं वेचणारी माणसं दिसतात. त्यांचं चित्रण वास्तववादी असून चेहरे प्रसन्न आहेत.
चित्रात तीन पुरुषांच्या आकृती आहेत. त्या पुरुषांच्या हातात कमळपुष्पे आहेत. त्यांचा वर्ण तांबूस आहे. मात्र, त्यातला एक पुरुष सुवर्णादित (सोनेरी) रंगाचा आहे. पाणी सांकेतिक पद्धतीनं दर्शवलेलं आहे. मासे व हंस पाण्यात विहार करत आहेत. कमळाचे देठ लयबद्ध आहेत. हे सरोवर जैन पुराणकथेतला भाग असावं.
या सर्व दृश्यांव्यतिरिक्त इथं काही रत्नजडित आभूषणं घातलेल्या नृत्यांगना, स्वरसुंदरी यांची चित्रं पाहायला मिळतात. काही दांपत्येही रेखाटलेली दिसतात. डावा हात दंडमुद्रेत व उजवा हात पताकामुद्रेत अशा नृत्याविर्भावात असलेली अप्सरा स्वरसुंदरी थोडी कललेली आहे. तिची नजर बाजूला रोखलेली आहे. ती नटराजाच्या अवस्थेत जाणवते, तर दुसरी नृत्यांगना स्तंभावर रेखाटलेली आहे. तिनं डावा हात आनंदानं पसरला आहे. उजवा हात पताकामुद्रेत आहे.
स्त्रीप्रतिमा, केशभूषा, केशसंभारातली फुलं, मोती ही आभूषणं आहेत. सडपातळ अंगकाठी, सिंहकटी यांमुळे ती विलक्षण मोहक वाटते. या स्वरसुंदरीच्या आकृती प्रमाणबद्ध असून त्या आकृतींच्या अंगप्रत्यंगातून अभिव्यक्त होणारी लयबद्धता चित्रकारानं अत्यंत कौशल्यानं रेखाटलेली आहे. चित्रं वास्तववादी वाटतात. या चित्रांचं तंत्र अजिंठाचित्रांशी मिळतंजुळतं आहे. अजिंठाशैलीचा प्रभाव इथं दिसतो. ही सर्व चित्रं फ्रेस्को-पेंटिंग आहेत.
अजिंठा, श्रीलंकेतील श्रीगिरी, मध्य प्रदेशातलं बाघ इत्यादी भित्तिचित्रांची परंपरा इतिहासातून पुढं येते. त्याचबरोबर दक्षिण भारतातल्या आतापर्यंत ज्ञात असलेल्या सर्वात प्राचीन फ्रेस्कोंपैकी सित्तनवासल हे आहे. ते सुरुवातीच्या जैन भित्तिचित्रांचं एकमेव उदाहरण आहे. वापरण्यात येणारं तंत्र ‘फ्रेस्को-सेको’ म्हणून ओळखलं जातं. म्हणजेच, अशी पेंटिंग्ज् कोरड्या भिंतीवर केली जातात. युरोपमध्ये भित्तिचित्रं ही भिंत ओलसर असताना केली जातात.
त्यांना ‘फ्रेस्को ब्यूनो’ असं म्हणतात. डॉ. एस.परमशिवन यांनी या चित्रतंत्रांचं सखोल विश्लेषण केलं आहे. त्यानुसार पांढऱ्यासाठी चुना, काळ्या रंगासाठी दिवाकाळा (दिव्याची काजळी), पिवळ्या आणि लाल रंगासाठी ओचर, हिरव्या रंगासाठी टेरे व्हर्टे इत्यादी खनिज रंग वापरण्यात आलेले आहेत. सन १९३७ ते १९३९ यादरम्यान पदुकोट्टईच्या महाराजांनी चित्रं स्वच्छ-साफ करून घेतली आणि प्रिझर्व्हेटिव्ह कोटिंग लावून ती जतन करून ठेवण्यात आली आहेत.
हिमनद्यांनी वेढलेला माउंट कामेट
तिबेट व भारताची सीमा म्हणजे विस्तीर्ण पसरलेला हिमालय. लडाखपासून अगदी अरुणाचलपर्यंत तिबेट व भारताच्या मध्ये हिमालयातील विविध पर्वतरांगा अन् नद्यांचा समावेश आहे. यातील उत्तराखंड राज्यातील गढवाल भागामध्ये हिमालयातील झस्कार रांगेचा समावेश होतो. या पर्वतरांगेचं वैशिष्ट्य म्हणजे येथील उंचच उंच शिखरं.
पाकिस्तानव्याप्त काश्मीर वगळता भारताच्या हद्दीत असलेल्या हिमशिखरांपैकी दुसरं उंच शिखर म्हणजे माउंट कामेट याच पर्वतरांगेत वसलेलं आहे. पश्चिम हिमालयाचा भाग असलेल्या या शिखराची उंची आहे तब्बल सात हजार ७५८ मीटर. माना, अबी गामीन, मुकुट पर्वत यांच्यासारखी पर्वत शिखरं, विस्तीर्ण पसरलेल्या हिमनद्या अन् अनवट हिमालय यांच्या सान्निध्यात कामेट शिखर उभं आहे.
दुरून पाहिल्यावर असं वाटतं, की हिमानं आच्छादलेला एखादा मोठा पिरॅमिड. ज्याचा माथा हा काहीसा सपाट आहे.

१८५० च्या दशकांत हिमालयातील विविध शिखरं व त्याची विविध रूपं ब्रिटिशांनी जगासमोर आणली. अनादी काळापासून उभ्या असलेल्या, भारताच्या जाज्वल्य इतिहासाची साक्ष सांगणाऱ्या विविध शिखरांपैकी एक असलेले कामेटचा पहिलं सर्वेक्षण १८५५ मध्ये अँड्रू वॉ यांनी केलं. गिर्यारोहणाच्या दृष्टीनं मात्र कामेट प्रकाशझोतात आले ते १९०७ मध्ये. गिर्यारोहणाच्या क्षेत्रामध्ये कामेटची गणना ही रांगडा पर्वत म्हणून केली जाते.
ब्रिटिश गिर्यारोहक टी. जी. लॉंगस्टाफ़, एम. पी. नोल्स आणि सी. एफ. मीड यांनी या रांगडेपणाचा चांगलाच अनुभव घेतला. सतत बदलणारं हवामान, तुफान हिमवर्षाव आणि मुळात कामेट शिखराची भौगोलिक रचना यांमुळे या शिखरावरील पहिली गिर्यारोहण मोहीम अर्थातच अयशस्वी ठरली. त्या काळात समाजानं आधुनिकतेची कास धरलेली नव्हती.
त्यामुळं अर्थातच गिर्यारोहण क्षेत्रात देखील उपकरणं, विविध संसाधनं यांची ओळख व्हायची होती, त्यामुळे गिर्यारोहकांना समोर येणारी आव्हानं पेलताना सर्वच आघाड्यांवर कस लागायचा. त्या परिस्थितीचा विचार करता कामेट शिखर चढाईचा विचार करणं, हे देखील धाडसाचं होतं. त्यानंतर तब्बल २४ वर्षांनी फ्रँको-स्विस गटाने कामेटचं शिवधनुष्य पेलण्याचा निर्धार केला.
चार्ल्स पाथ यांच्या नेतृत्वाखाली पॉल बाऊर, रेमंड लंबर्ट, क्वेनेट रिली यांनी सर्व आव्हानांचा सामना करत कामेट शिखर गाठलं. त्या काळी इतक्या उंच शिखरावर चढाई करणं हे दुर्मीळ होतं. गिर्यारोहण क्षेत्राची खरी पायाभरणी करण्यात ज्या घटनांचा समावेश होतो, त्यापैकी एक म्हणजे १९३१ ची ही चढाई असं मानलं जातं. गिरिप्रेमीनं देखील १९९४ मध्ये माउंट कामेट शिखर मोहिमेचं आयोजन केलं होतं.
राजेश पटाडे, प्रसाद ढमाल, मोरेश्वर कुलकर्णी, वसंत लिमये अशा तगड्या गिर्यारोहकांचा संघ होता. मात्र, कामेटची आव्हानं गिरिप्रेमीच्या गिर्यारोहकांच्या जिद्दीपेक्षा वरचढ ठरली. मोहीम अयशस्वी झाली. मात्र, या संघाला रिकाम्या हातानं परत जाणं मान्य नव्हतं.
त्यांनी कामेटनं दिलेली हुलकावणी मागे सारून अगदी बाजूलाच उभ्या असलेल्या अबी गामीन या सात हजार ३५५ मीटर उंच शिखरावर चढाई केली. माउंट कामेट शिखराचा मार्ग हा पूर्वेकडील हिमनदीवरून सुरू होतो व मीड कोलच्या मार्गे शिखराकडं जातो.
अबी गामीन व माउंट कामेट शिखराचा मार्ग याच मीड कोलहून वेगळा होता. १९०७ मध्ये जेव्हा पहिल्यांदा कामेट शिखरावर मोहिमेचा प्रयत्न केला होता, त्या वेळी गिर्यारोहक सी. एफ. मीड हे अबी गामीन व माउंट कामेट यांना वेगळं करण्याऱ्या कोलपर्यंत पोहोचले होते. तेव्हाच्या काळाचा विचार करता अशी कामगिरी करणं हे अचाट होतं.
त्यांच्या या कार्याचा गौरव म्हणून या कोलला मीड कोल किंवा मीड यांची कोल असं नामकरण करण्यात आलं. या कोलहून शिखराकडं जाताना पश्चिमेकडून जोराने वाहणारे वारे गिर्यारोहकांची परीक्षा पाहतात. पठारसदृश भाग खालच्या भागात असल्यानं या वाहत्या वाऱ्यांना मोकळी दिशा मिळते, त्यामुळं यांचा वेग प्रचंड असतो.
सोबतच सततचा हिमवर्षाव व हिमनद्यांमुळं होणारी हालचाल गिर्यारोहकांना हैराण करून सोडतात. या सगळ्या दिव्यांतून पुढं गेलं, की अंगावर येणारी खडी चढण, तिथं असलेला टणक दगड गिर्यारोहकांचे स्वागत करतात, म्हणूनच अनुभवी अन् निष्णात गिर्यारोहकांची देखील कामेट शिखर चढाई करताना दमछाक होते.
कामेट शिखराचं, आजूबाजूच्या परिसराचं भौगोलिक महत्त्व मोठं आहे. तिबेट म्हणजे अर्थात चीन व भारताच्या सीमा ठरविणारा हा परिसर आहे. जुन्या काळापासून तिबेट व भारतामध्ये दळणवळण व विविध व्यापारी मार्ग जे तयार झाले त्यापैकी माना पास हा कामेट शिखर परिसरातच आहे. तसेच कामेटच्या दोन्ही बाजूंनी असलेल्या हिमनद्या या देखील हिमालयाशी निगडित जीवसृष्टीसाठी महत्त्वाच्या आहेत.
कामेट पश्चिम हिमनदी ही कामेट, अबी गामीन व मुकुट पर्वत प्रदेशातून पुढं विस्तारत जाते व सरस्वती नदीचा प्रमुख स्रोत बनते. दुसरीकडे कामेटची पूर्व हिमनदी ही कामेट व माना शिखरांच्या भोवती विस्तारात जाते व पुढे जाऊन धौलीगंगा व अलकनंदा नदीचा मुख्य स्रोत बनते. माउंट कामेट हा ‘ग्लेशियर ऑफ फायर’ म्हणून देखील ओळखला जातो.
सूर्योदय व सूर्यास्ताच्या वेळी सूर्य किरणांनी न्हाऊन गेलेला शिखरमाथा एखाद्या तांबट रंगाच्या मुकुटासारखा भासतो. शिखराहून परावर्तित झालेले सोनकिरणं कामेट शिखराच्या सभोवताली असलेल्या हिमनद्यांवर म्हणजेच ग्लेशियर्सवर अशा पद्धतीनं दिसतात जणू काही या ग्लेशियर्सवर अग्निज्वाला फुटल्या आहेत. हे दृश्य मोहून टाकणारे असते.
भारताच्या पुरातन इतिहासामध्ये देखील माउंट कामेटचा विविध ठिकाणी उल्लेख आहे. हिमालयातील अनेक पर्वतांचं नातं हे भगवान शंकराशी जोडलं गेलं आहे, अर्थात कामेट देखील याला अपवाद नाही. १९०७ मध्ये रानीखेतपासून तब्बल दोन महिने घनदाट जंगलातून वाट काढत गिर्यारोहकांचा संघ कामेटच्या पायथ्याशी पोहोचला होता. आज परिस्थिती बऱ्यापैकी सुधारली आहे.
जोशी मठहून नीती गावापर्यंत ९० किलोमीटर गाडीचा प्रवास करून पुढं बासुधारा मार्गे डोबला ताल या माउंट कामेटच्या पायथ्यापर्यंत २३ किलोमीटरचा ट्रेक करून पोहोचता येतं. हा संपूर्ण मार्ग तसा खडतर आहे, त्यामुळं ट्रेकिंगचा उत्तम अनुभव असेल व नेहमीपेक्षा वेगळा हिमालय बघायचा असेल, तर हा ट्रेक उत्तम आहे.
साहसी निसर्गानुभव
- विशाखा बाग
कॅनडाच्या अवर्णनीय सौंदर्यात आपण आजही फिरायला निघणार आहोत. क्षेत्रफळानुसार संपूर्ण जगात नंबर दोनवर असलेला हा देश त्याच्या लांबच लांब समुद्रकिनाऱ्यासाठीसुद्धा ओळखला जातो. कॅनडाला दोन लाख किलोमीटरची किनारपट्टी लाभलेली आहे. जगातील सर्वात जास्त समुद्र किनारपट्टी लाभलेला हा एकमेव देश आहे.
वाळवंट सोडून निसर्गातील सर्व प्रकारची वैशिष्ट्ये कॅनडामध्ये अनुभवायला मिळतात. पर्वतराजी, तलाव, तळी, जंगल, बारमाही दुथडी भरून वाहणाऱ्या नद्या, बर्फाळ प्रदेश आणि अद्ययावत शहरीकरण झालेली नावाजलेली मोठी शहरे हे सर्व काही कॅनडाच्या ट्रीपमध्ये आपल्याला अनुभवायला मिळते.
बांफनंतर लेक लुईवरून आम्ही बसने ब्रिटिश कोलंबिया या प्रदेशातील डोंगरामधल्या अत्यंत देखण्या रस्त्याने कोलंबिया आईस फिल्डला जायला निघालो. या सिनिक रूटने जाताना आमच्या दोन्ही बाजूंना जंगल आणि बऱ्याच वेळेला आजूबाजूला बर्फदेखील होता.
कॅनडातील रस्ते रुंद आणि मोठे आहेत. एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे या जंगलांमध्ये वन्यजीव बऱ्याच मोठ्या प्रमाणावर आढळतात. याच रस्त्याने जाताना अचानक दोन ग्रिझली बियर आम्हाला आडवे आले.
कॅनडामध्ये ग्रिझली बियर म्हणजेच अस्वल बऱ्याच मोठ्या प्रमाणावर दिसतात. या वन्यजीवांना जंगलातल्या एका बाजूने दुसऱ्या बाजूकडे जायचे असेल तर झाडाझुडपांनी व्यवस्थितरीत्या झाकलेले पूल या रस्त्यावर तयार करण्यात आलेले आहेत.
आम्ही या रस्त्यावरून जाण्याची मजा घेत असतानाच एकीकडे डोक्यात मात्र अथाबास्का व्हॅलीमधील ग्लेशियरवर जाण्यासाठी प्रचंड उत्सुक होतो. कॅनडियन रॉकी पर्वतराजींच्याच मध्ये ब्रिटिश कोलंबिया आणि अल्बर्टा या दोन प्रदेशांच्या सीमेवर दहा हजार वर्षांपेक्षाही जुने कोलंबिया आईस फिल्ड अस्तित्वात आहेत.
ग्लेशियर डिस्कव्हरी सेंटरमध्ये पोहोचल्यानंतर आपल्या पॅकेजमध्ये दुपारचे जेवणसुद्धा समाविष्ट असते. जेवण करून मगच अत्यंत मोठ्या ग्लेशियर ट्रकमध्ये किंवा बसमध्ये आपल्याला बसवण्यात येते आणि तिथून मग आपण संपूर्णतः बर्फावरूनच साधारण ३० ते ४० मिनिटांत अत्यंत कठीण चढ चढून दहा हजार वर्षे जुन्या बर्फाच्छादित डोंगरावर म्हणजेच ग्लेशियरवर पोहोचतो.
ग्लेशियर ट्रकचा अनुभव विलक्षण होता आणि मुख्य म्हणजे आमची ट्रक चालवणारी ड्रायव्हर ही २५ वर्षांची मुलगी होती. ज्या आत्मविश्वासाने तो प्रचंड मोठा ट्रक ती चालवत होती आणि तेसुद्धा बर्फाच्छादित डोंगरावर, हे बघून मी मनोमन तिला शुभेच्छा दिल्या आणि तिच्याबरोबर फोटोसुद्धा काढला.
बर्फात खाली उतरून मनसोक्त खेळून आणि फोटो काढून पुन्हा त्याच ट्रकने आपण डिस्कव्हरी सेंटरवर परत येतो. त्यानंतर अजून एका विलक्षण ठिकाणी पोहोचायचे होते. तो अनुभवसुद्धा दहा हजारांत एक असाच म्हणावा लागेल.
आईस फिल्डपासून जवळच सनवाप्टा व्हॅलीवर आईस फिल्डच्या वर गोल आकारामधला संपूर्ण काचेचा पूल बांधलेला आहे. ६० मीटर उंच असलेला हा ग्लेशियर स्कायवॉक ४५० मीटर लांब आहे. खाली खोल बर्फाची दरी, आजूबाजूला जंगल, बर्फाचे डोंगर आणि वरून आपण संपूर्णतः काचेच्या पुलावरून हे सगळे दृश्य बघत असतो. हा नजारा मनातून न घालवता येण्यासारखाच.
इथून मग असेच अनेक वेगवेगळे ग्लेशियर बघत आम्ही व्हिसलर गावाला जायला निघालो. व्हिसलर हे खरे तर गाव नाही म्हणता येणार, कारण हे एक स्की रिसॉर्ट टाऊन म्हणून प्रसिद्ध आहे. कोस्ट माऊंटन नावाच्या पर्वतराजीमध्ये हे गाव वसवलेले आहे.
पर्वत आणि जंगलांमधील वेगवेगळ्या साहसी खेळांसाठी हे स्की रिसॉर्ट टाऊन म्हणून प्रसिद्ध आहे. नीटनेटके वसवलेले हे गाव अतिशय देखणे आहे. मुख्यतः पर्यटकांसाठीच असलेले हे गाव वेगवेगळे रिसॉर्ट्स, हॉटेल, कॅफे, रेस्टॉरंट, गेम झोन, बागबगिचे आणि साहसी खेळांचे मुख्य केंद्र अशा अनेक ठिकाणांनी परिपूर्ण आहे.
छोट्याशा असलेल्या या गावात दरवर्षी २० लाख पर्यटक येत असतात. गावात पोहोचल्यानंतर आम्ही हॉटेलमध्ये चेक-इन करून गाव बघायला बाहेर पडलो. या छोट्याशा गावामधून एक नदीसुद्धा वाहते.
या देखण्या गावात अनेक ठिकाणी फोटो काढण्याची इच्छा तुम्हाला नक्कीच होते. संध्याकाळी लाईट लागल्यानंतर तर हे गाव अतिशय रोमँटिक वाटत होते. इथे तुम्ही माऊंट बाईकिंग, स्नो बोर्डिंग, स्कीईंग, स्की जम्पिंग, झीप लाइनिंग आणि बंजी जम्पिंग हे सगळे करू शकता. आम्ही दुसऱ्या दिवशीच झीप लाइनिंग बुक केले होते.
आमच्या या पॅकेजमध्ये पाच वेगवेगळ्या प्रकारच्या झीप लाइन्स समाविष्ट होत्या. व्हिसलर या गावातून आपण गंडोला राईडने व्हिसलर माऊंटनवर जातो आणि तिथून चार वेगवेगळ्या ट्री टॉप ब्रिजवरून आपण या पाच वेगवेगळ्या झीप लाईन करू शकतो. कमीत कमी २०० फुटांपासून ते जास्तीत जास्त २४०० फुटांपर्यंत लांब झीप लाईनवर आम्ही थरारक अनुभव घेतला.
साधारण तीन तास ही संपूर्ण ॲक्टिव्हिटी करायला लागतात, पण हा आयुष्यातला न विसरता येण्यासारखा रोमांचकारी अनुभव आम्ही घेतला होता. एका बाजूला बर्फाच्छादित डोंगर, खाली दाट जंगल आणि त्यावरून आपण झीप लाईनने एका टोकाकडून दुसऱ्या टोकाला जातो हा अनुभव शब्दांत मांडण्यासारखा नाही. तुम्हीसुद्धा इथे कधी भेट दिली तर एक तरी साहसी खेळ नक्की खेळून बघा.
अजून इथले एक महत्त्वाचे पर्यटकांचे आकर्षणाचे केंद्र म्हणजे पिक टू पिक गंडोला राईड. व्हिसलरच्याच पर्वतराजीत ब्लॅककाँब रिसॉर्टला जाण्यासाठी ही केबल कार वापरावी लागते; परंतु ज्यांना रिसॉर्टला जायचे नाही ते पर्यटकसुद्धा डोंगराच्या समिटवर जाण्यासाठी केबल कार वापरू शकतात.
अर्थातच तिकीट काढून आपल्याला वर जाता येते; पण तिथे गेल्यानंतर दिसणारे दृश्य डोळ्यांत मात्र किती साठवू आणि नाही, असे होऊन जाते. निसर्गाचे हे अप्रतिम दान कॅनडाच्या झोळीत देवाने भरभरून टाकले आहे आणि त्याचाच प्रत्यय आपल्याला वरून दिसणाऱ्या दृश्यात होतो.
पर्वतराजी, तलाव, नदी, जंगल आणि डोंगरांच्या माथ्यावर विसावणारे स्वच्छ निळे आकाश ही इतकी साधी नैसर्गिक वैशिष्ट्ये तिथे मात्र अप्रतिमरीत्या जुळून आली होती आणि त्या दृश्यांची महती काय वर्णावी! जवळजवळ एक-दीड किलोमीटर लांब असा लाकडी स्कायवेसुद्धा तिथे आहे.
तिथून फिरत फिरत चारी बाजूंचे दृश्य तुम्ही डोळ्यात साठवू शकता. कॅमेऱ्यात आणि डोळ्यांत ती दृश्ये टिपण्यासाठी सर्वांचीच लगबग तिथे दिसत होती. मी मात्र स्कायवेवर एक चक्कर मारून नंतर रेस्टॉरंट वगैरे कुठेही न जाता त्या अप्रतिम दृश्याकडे स्तंभित होऊन हरवल्यासारखी बघत बसले होते. अजूनही तो क्षण, ते दृश्य डोळ्यांसमोरून जात नाही.
भारतासाठी सध्यातरी कॅनडा हा देश आणि विषय दोन्ही बरेच मोठे आहेत. आपलीसुद्धा कॅनडाची ही भ्रमंती अजूनही पुढच्या अनेक भागांमध्ये आपण बघणारच आहोत. अजूनही बऱ्याच रोमांचकारक गोष्टी, ठिकाणे या कॅनडामध्ये आपल्याला अनुभवायची आहेत.
gauribag७@gmail.com (लेखिका वित्त सल्लागार आणि कॉर्पोरेट ट्रेनर आहेत.)
निसर्गरम्य कॅनडाची नजरबंदी
- विशाखा बाग
निसर्गाची मुक्त उधळण असलेला कॅनडातील बांफचा परिसर म्हणजे न चुकवता येण्यासारखं एक महत्त्वाचं स्थळ. कॅनडा म्हणजे एक नितांत सुंदर निसर्गसौंदर्याने नटलेला सुंदर देश.
कॅनडा, एक नितांत सुंदर, निसर्गाने नटलेला आणि विस्तीर्ण पसरलेला देश... सध्या भारताचे आणि कॅनडाचे संबंध ताणले गेलेले असले तरीही तिथल्या निसर्गाचा आविष्कार नाकारून चालणार नाही. अटलांटिक, आर्क्टिक आणि प्रशांत महासागराचा तिन्ही बाजूंनी वेढा असलेला आणि भूभागानुसार जगातील क्रमांक दोनचा असलेला हा देश.
पूर्व आणि पश्चिम असे दोन्ही कॅनडाचे भाग बघण्यासारखे आहेत. प्रचंड मोठ्या प्रमाणात पसरलेल्या या देशात पूर्व आणि पश्चिम कॅनडामध्ये पूर्णपणे वेगवेगळे निसर्गाचे आविष्कार आणि शहरं बघायला मिळतात. मोठे स्वच्छ व गोड्या पाण्याचे तलाव, बारमाही वाहणाऱ्या नद्या, जगविख्यात असलेली रॉकी पर्वतराजी आणि इतरही बर्फाच्छादित मोठमोठे पर्वत अन् डोंगर हे सर्व काही आपल्याला कॅनडामध्ये बघायला मिळतं.
टोरंटो, व्हँकुव्हर, ओटावा, व्हिक्टोरिया, क्युबेक आणि मॉन्ट्रियलसारखी इथली अनेक अद्ययावत शहरंही बघण्यासारखी आहेत. त्यांची वैशिष्ट्ये अशी आहेत, की इथे शहरांमध्येच, शहराबरोबरच पावलोपावली निसर्गसुद्धा तुम्हाला अनुभवायला मिळतो.
कामानिमित्ताने मी पूर्व आणि पश्चिम अशा दोन्ही भागांना भेट दिली होती. आज हा लेख लिहिताना पुन्हा एकदा कॅनडा डोळ्यांसमोर उभा राहिला. तसं म्हटलं तर मी या देशाच्या नक्कीच प्रेमात आहे. भरपूर निसर्गसौंदर्याने भरलेल्या या शहरांमध्ये कामाच्या संधीसुद्धा तेवढ्याच उपलब्ध आहेत. आज मी तुम्हाला अशाच अद्भुत निसर्गसौंदर्याने नटलेल्या बांफ या गावाला घेऊन जाणार आहे.
कॅलगरी या मोठ्या शहरापासून साधारण दीड तासात आपण बांफला पोहोचतो. भारतातून कॅलगरीसाठी विमान सेवा उपलब्ध आहे. कॅलगरी ते बांफ यामधील रस्ता आपण एन्जॉय करत करत आणि गाडीतून बाहेर निसर्ग बघता बघता बांफ केव्हा येतं ते कळतही नाही.
गावात शिरतानाच रस्त्याच्या बरोबर दुसऱ्या बाजूला टोकाशी बर्फाच्छादित डोंगर आपलं स्वागत करतो. दोन्ही बाजूंना नेटकी लाकडी घरं, रेस्टॉरंट आणि हॉटेल्समधून जाणारा मोठा आणि स्वच्छ रस्ता आहे. त्याच्या दुसऱ्या टोकाला बर्फाच्छादित डोंगर, हे गावात शिरताक्षणीच दिसणारं चित्र मी कधीही विसरू शकत नाही.
बांफ हे गाव अनेक कारणांनी जगभरात प्रसिद्ध आहे. बांफ नॅशनल पार्क हा कॅनडातील पहिला आणि जगातील तिसरा नॅशनल पार्क आहे. हे गाव रॉकी पर्वतांच्या सान्निध्यात आणि या नॅशनल पार्कमध्येच वसलेलं आहे. युनेस्को वर्ल्ड हेरिटेज साईट म्हणून नामनिर्देशित असलेलं हे गाव एक नावाजलेलं पर्यटन स्थळ आणि बांफ माऊंटेन फिल्म फेस्टिवलसाठीसुद्धा जगप्रसिद्ध आहे.
बो नदीच्या काठावर वसलेले हे गाव, इथे असलेल्या सल्फरयुक्त गरम पाण्याच्या झऱ्यासाठी आणि तलावांसाठीसुद्धा प्रसिद्ध आहे. येथील महत्त्वाचं आकर्षण म्हणजे बांफ गंडोला. गावापासून फक्त दहा-बारा मिनिटांच्या अंतरावर असलेल्या सल्फर नावाच्या डोंगरावर या केबल कारमधून आपल्याला जाता येतं. २२९२ फूट उंच असलेल्या या डोंगराच्या टोकावर जाण्यासाठी केबल कारने फक्त आठ मिनिटं लागतात.
जवळपास बाराही महिने ही केबल कार सुरू असते. वर गेल्यानंतर दिसणारं अप्रतिम दृश्य कधीही न विसरण्यासारखंच... संपूर्ण नॅशनल पार्कचा परिसर, बो नदी, बांफ गाव आणि आजूबाजूच्या रॉकीजच्या बर्फाच्छादित पर्वतरांगा. निसर्गाने अमाप सौंदर्याची उधळणच इथे केलेली दिसते. अर्धा दिवस तरी तुम्ही नक्की इथे घालवू शकता.
आम्ही इथे पोहोचल्यानंतर इथल्या लाकडी ‘स्काय वे’वर चालण्याचा आनंद घेतला. मनसोक्त फोटो काढले आणि स्काय रेस्टॉरंटमध्ये कॉफीसुद्धा घेतली. इथे एक मिनी थिएटरसुद्धा आहे, त्यामध्ये तुम्हाला इथली एक माहितीवजा फिल्म दाखवली जाते.
संपूर्ण बांफच्या परिसरात छोटे-मोठे जवळपास एक डझनपेक्षाही जास्त तलाव आहेत. एकापेक्षा एक सरस आणि रम्य परिसर या तलावांच्या आजूबाजूला आपल्याला अनुभवायला मिळतात. त्यातीलच महत्त्वाच्या दोन तलावांना आम्ही भेट दिली. मोरेन लेक आणि लेक लुई अशा दोन्ही ठिकाणी तुम्ही कयाकिंग, बोटिंग आणि हायकिंगसारखे साहसी खेळ खेळू शकता. स्वच्छ आरसपानी असं तलावातील निळसर हिरवं पाणी, तलावाच्या मागे एका बाजूला घनदाट झाडी आणि त्यामागे बर्फाच्छादित डोंगर. या दृश्याची तुलना जगातील कोणत्याही मानवनिर्मित गोष्टीशी होऊ शकत नाही.
असंच अजून एक महत्त्वाचं ठिकाण म्हणजे बो वॉटर फॉल. गावापासून फक्त एक ते दीड किलोमीटर अंतरावर असलेला हा वॉटर फॉल. इथे तुम्ही चालतसुद्धा जाऊ शकता. फक्त काळजी घेण्यासाठी काही गोष्टी बरोबर ठेवणं आवश्यक असतं. जसं की, खाण्यापिण्याच्या गोष्टी तर आहेच; पण त्याचबरोबर ‘बेअर स्प्रे’ म्हणजेच अस्वलांसाठीचा फवारा कायम बरोबर असावा लागतो. कॅनडामध्ये वन्यजीवही मोठ्या प्रमाणावर आहेत. मोठी हरणं किंवा सांबर (मूस), रानटी उंदीर, मुंगूस, माऊंटन गोट आणि अस्वलांसारखे प्राणी इथे कायम तुम्हाला कधीही अगदी गावातसुद्धा दिसू शकतात, पण आम्हाला मात्र खूपच थ्रिलिंग अनुभव आला... जाताना आणि येतानासुद्धा.
एकंदरीतच संपूर्ण कॅनडा आणि निसर्गाची मुक्त उधळण असलेला बांफचा परिसर म्हणजे आयुष्यातील न चुकवता येण्यासारखं एक महत्त्वाचं स्थळ नक्कीच आहे. त्याशिवाय बांफच्या आजूबाजूला भेट देण्यासारखी अजूनही बरीच ठिकाणं आहेत. त्या आणि त्यासारख्या कॅनडातील अजून अनेक महत्त्वाच्या निसर्गरम्य स्थळांना आपण येणाऱ्या पुढच्या काही भागांत भेट देणारच आहोत.
gauribag7@gmail.com
अगम्य कैलास पर्वत
हिमालय म्हणजे देवभूमी. इथं देवांचा अधिवास अनादी काळापासून असल्याची अनेकांची श्रद्धा आहे, याच्या खुणा हिमालयात भटकंती करताना अनेकांना दिसतातही. याच हिमालयातील एक ‘महापर्वत’ म्हणजे नगाधिराज कैलास पर्वत. देवांचे देव महादेव यांचं आद्य ठिकाण, जिथं खऱ्या अर्थानं जीवन मोक्ष पावतं असा हा पर्वत. हिंदूच नव्हे तर बौद्ध अन जैन धर्मीयांचं पवित्र स्थान असलेला कैलास पर्वत हा जगभरातील अनेकांसाठी कुतूहलाचा विषय. अगदी दुर्गम भागांत, अति उंचीवर, हिमवर्षावानं नटलेल्या प्रदेशांत कैलास पर्वत वसलेला आहे.
तिबेट, नेपाळ व भारतीय सीमांवर असलेल्या ट्रान्स हिमालयातील अनेक अतिउंच शिखरांपैकी असलेल्या माउंट कैलासची उंची ६ हजार ६३८ मीटर इतकी आहे. या शिखराची रचना चौकोनाकृती असून टेक्टॉनिक प्लेट्सच्या तीव्र हालचालींमुळं असा आकार प्राप्त झाला असावा, असा भूगोल शास्त्रज्ञांचा कयास आहे.
कैलास पर्वताचा संपूर्ण भाग हा काळ्या-पांढऱ्या ग्रॅनाइटनं बनलेला असून शतकानुशतकं हवामानाचा, हिमवृष्टीचा झालेला परिणाम यावर दिसून येतो. पर्वताच्या चारही बाजू हिमानं आच्छादलेल्या असतात. काळ्या-करड्या, रूक्ष वाटणाऱ्या ओसाड डोंगरांच्या मधून उभारलेला पांढराशुभ्र कडा हा सर्वांचंच मन मोहून टाकतो. ग्रॅनाइट किंवा क्रिस्टलचं संस्कृत नाव म्हणजे केलास, अन् या केलासचं सुधारित रूप म्हणजे कैलास. म्हणून या पर्वत शिखराला कैलास नाव पडलं, असं सांगितले जातं.
कैलास पर्वताचं धार्मिक महत्त्व सर्वश्रुत आहे. हिंदू भाविक शेकडो वर्षांपासून कैलास मान सरोवर यात्रा करतात. कैलास शिखर आपल्या उजव्या हाताला ठेवून शिखराच्या भोवती प्रदक्षिणा अर्थात परिक्रमा करून मान सरोवरमध्ये डुबकी घेऊन मनःशांती व मनःशुद्धी करण्याची प्रथा हिंदू धर्मात आहे. ५६ किलोमीटरहून अधिक अंतर चालत पार करत ही परिक्रमा पूर्ण होते, यात १८- १९ हजार फूट इतक्या उंचीवर देखील जावे लागते.
या खडतर यात्रेसाठी लोक आपले प्राण पणाला लावून कैलासाच्या चरणी धाव घेतात. हा पर्वत शिखर एका अद्भुत ऊर्जेचा स्रोत आहे व यातूनच मोक्ष प्राप्ती होते, असा अनेकांचा विश्वास आहे. हिंदूच नव्हे तर बौद्ध धर्मीय देखील कैलास पर्वताला पवित्र स्थळाचा दर्जा देतात. कैलास पर्वत म्हणजे अध्यात्म्याचा स्रोत व शांतीचं प्रतीक.
जैनांचे पहिले तीर्थंकार रिषभांथा यांनी देखील कैलास पर्वताजवळील अष्टपदा येथे मोक्ष प्राप्ती केली, म्हणूनच हिंदू व बौद्धांप्रमाणं जैन धर्मीय देखील कैलास पर्वताची परिक्रमा करण्यासाठी, अष्टपदा येथे मोक्ष प्राप्तीचा अनुभव घेण्यासाठी उत्सुक असतात. अर्थात, येथील खडतर हवामान, अतिउंची, प्राणवायूचं असलेलं विरळ प्रमाण यामुळं कैलास यात्रा ही सगळ्यांनाच शक्य होते असं नाही. त्यात चीनच्या अधिपत्याखाली असलेल्या तिबेटमध्ये कैलास पर्वत वसलेला असल्यानं तिथं जाण्यासाठी परवानगी मिळविणं हे अजूनच अवघड जातं.
कैलास पर्वत हा गूढ व अगम्य असण्याची अनेक उदाहरणे आहेत. हा पर्वत म्हणजे पृथ्वीला स्वर्गाशी जोडणारा एक प्रकारचा पूलच. त्यामुळं अद्भुत शक्तींनी या परिसराला वेढलेलं आहे, असं अनेक जण मानतात. पर्वत शिखराच्या पायथ्याशी असलेला ‘मान सरोवर’ हा कोणत्याही ऋतूत एखाद्या स्थितप्रज्ञ ऋषींप्रमाणे स्थिर असतो. या परिसरात गेल्यावर मानवाची वाढ झपाट्यानं होतं, असं मानतात. कैलास मान सरोवर यात्रेहून आलेल्या अनेकांची नखं, केस हे तुलनेनं झपाट्यानं वाढलेली असतात, असं अनेक जण सांगतात. हे सगळं येथील अद्भुत ऊर्जेमुळे होतं, असं म्हणतात.
६ हजार ६३८ मीटर उंच असणाऱ्या कैलास शिखरावर आजपर्यंत एकही गिर्यारोहण मोहीम यशस्वी झाली नाही. म्हणजे कैलास शिखराचा माथा अजूनही मानवासाठी अनवट व अनभिज्ञ आहे. या शिखराला हिंदू, बुद्ध व जैन धर्मीयांमध्ये असलेलं अनन्यसाधारण महत्त्व आहे. हिंदूंसाठी कैलास पर्वत म्हणजे आदी शंकराचे स्थान, हा तोच भाग जिथून पृथ्वी ही स्वर्गाला जोडली जाते. अशा पवित्र ठिकाणी उगीचच लोकांच्या श्रद्धेला आव्हान देऊन अट्टाहासाने चढाई करणे म्हणजे गिर्यारोहण नव्हे, अशी समस्त गिर्यारोहकांची भावना आहे.
इथल्या पावित्र्याचं महत्त्व जपत, लोकांच्या भावनेचा आदर करत गिर्यारोहक देखील कैलास पर्वतासमोर नतमस्तक होतात. याविषयी एकदा जगातील चौदा अष्टहजारी शिखरांवर पहिल्यांदा चढाई करणारे (ती देखील कृत्रिम प्राणवायूच्या मदतीशिवाय) इटलीचे प्रसिद्ध गिर्यारोहक रेन्होल्ड मेस्नर यांना कैलास शिखर मोहिमेविषयी विचारले असता ते म्हणाले, “ज्या पर्वत शिखराशी करोडो लोकांच्या भावना जोडल्या गेल्या आहेत, जिथं अनेकांची श्रद्धा असलेला देव वसला आहे, तिथं मी मुद्दामहून गिर्यारोहण मोहीम आखणे, हे मला सुसंगत वाटत नाही. गिर्यारोहणाचा पहिला नियम हाच आहे, की पर्वताचा आदर करणं. कैलास शिखराविषयी माझे मत सुस्पष्ट आहे. मी शिखरावर चढाईचा विचार करण्यापेक्षा नतमस्तक होण्यास अधिक प्राधान्य देईन.'
विशेष म्हणजे १९८० च्या दशकांत चीन सरकारनं रेन्होल्ड मेस्नर यांना कैलास पर्वत चढाई करण्याची परवानगी दिली होती, ती त्यांनी याच कारणांमुळे विनम्रपणे नाकारली.
कैलास पर्वत हा एक गूढ विषय आहे. येथे मिळणारी आत्मशांती, सतत बदलणारे हवामान व सोबतीला येथे जाणवणारी एक अद्भुत ऊर्जा ही कैलास पर्वताला इतरांपेक्षा वेगळं बनवते. हा नेहमीचा पर्वत नाही, असं येथे जाणारे असंख्य लोक सांगतात, मग ते ट्रेकर्स असो वा श्रद्धाळू ! इथे जाणारा व्यक्ती कोणत्याही धर्माचा असो, जगातील कोणत्याही प्रांताचा असो... सगळ्यांनाच कैलास पर्वत अद्भुत जाणवतो, हे मात्र नक्की!
पल्लवांचं वैभवशाली महाबलीपुरम
- केतन पुरी, ketan.author@gmail.com
तमिळनाडू अनेक गोष्टींसाठी प्रसिद्ध आहे. देशातलं दक्षिणेकडील राज्य आणि आग्नेय आशियासोबत कमीत कमी हजार वर्षांपासूनचे संबंध अबाधित ठेवणारा भूभाग म्हणून तमिळनाडू प्रसिद्ध आहे. पल्लव, चोळ, मराठ्यांसारख्या राजसत्तांनी या राज्यात अनेक धार्मिक वास्तू उभारल्या, महाल उभारले, ग्रंथालयं उभारली.
तमिळनाडूमधील मंडगपट्टू येथे पल्लव राजा महेंद्रवर्मन याने पहिली शैवलेणी खोदली. ‘वीट, लाकूड अथवा कोणत्याही धातूविरहित’ ही वास्तू उभारण्यात आल्याचा शिलालेख महेंद्रवर्मननं कोरून ठेवला.
यानंतर तमिळनाडूत स्थापत्यामध्ये फार मोठा बदल घडला. पल्लव आणि बदामी चालुक्यांच्या सततच्या युद्धामुळं जितके अनिष्ट परिणाम या भागावर झाले, तेवढ्याच प्रमाणात कलेची देवाणघेवाण या दोन राज्यांमध्ये झाली. पल्लवांच्या स्थापत्यशैलीचे मुख्यत्वे तीन भाग पडतात आणि हे तिन्ही टप्पे तीन राजांच्या नावे ओळखले जातात. पहिल्या टप्प्यात लेण्यांची निर्मिती दिसते, ज्याचं श्रेय जातं महेंद्रवर्मनला.
दुसऱ्या टप्प्यात लेणी मंदिर, एकाश्म मंदिर (केवळ एका दगडातून साकारलेलं ) आणि काही प्रमाणात बांधीव मंदिरांचा प्रयोग आढळतो. याचं श्रेय नरसिंहवर्मनला जातं. तिसऱ्या टप्प्यात पूर्णपणे बांधीव मंदिरांची उभारणी झाली, ज्याचा निर्माता राजसिंहवर्मन आहे. हे तीन पल्लव राजे आणि त्यांच्या काळात विकसित होत गेलेल्या स्थापत्यशैलीचा प्रभाव कांची आणि परिसरात आपल्याला पाहायला मिळतो.
कांचीपुरम पासून केवळ साठ किलोमीटर अंतरावर एक महत्त्वाचं शहर समुद्र किनाऱ्यावर वसलंय. जिथं दीड हजार वर्षांपूर्वी पल्लव राजा नरसिंहवर्मन आपल्या प्रचंड फौजेनिशी येत असे, या भागात वावरत असे, समुद्र किनाऱ्याच्या बाजूला असलेल्या दगडांमध्ये एक वेगळीच दुनिया तयार करण्याची जबाबदारी त्यानं अनेक कलाकारांना दिली आणि एका समृद्ध शहराची उभारणी केली. त्या अतिशय सुंदर शहराला नाव देण्यात आले ‘मामल्लपुरम’ ऊर्फ ‘महाबलीपुरम’.
नरसिंहवर्मन याचा उल्लेख कित्येकदा ‘मामलं’ म्हणून करण्यात आलाय. मामल्ल म्हणजे महान मल्ल. त्याच नावापासून महाबलीमपुरम रूढ झाल्याचं मत अनेक अभ्यासकांचं आहे. दुसरीकडं, दानशूर राजा बळी याच्याशीही या गावाचा इतिहास जोडला गेल्याचा उल्लेख स्थानिक लोक आवर्जून करतात. पौराणिक तसेच ऐतिहासिक कथांनी हा प्रदेश समृद्ध झालेला आहे.
महाबलीपुरम गावात अनेक लेणी, अनेक बांधीव मंदिरं आणि एकाश्म मंदिरं जगप्रसिद्ध आहेत. ही पाच एकाश्म मंदिरं ‘पंच रथ’ नावाने लोकांच्या परिचयाची आहेत. त्यांची नावे सुद्धा लोकप्रिय पांडवाच्या नावावरूनच ठेवण्यात आली आहेत.
अर्जुन आणि कुंती रथ जवळ जवळ आहेत. सर्वांत मोठ्या रथाला ‘भीम रथ’ नावाने ओळखतात. त्याच्या बाजूला ‘धर्मराज रथ’ आहे तर समोर ‘नकुल-सहदेव रथ’ आहे. या पाच रथांसोबत एकाच दगडात कोरलेले नंदी, सिंह आणि हत्तीचं भव्य शिल्प आहे. धर्मराज रथावर बरेच शिलालेख आहेत. हे सर्व रथ आणि त्यांची निर्मिती सातव्या शतकातील. त्यासाठी हा नरसिंहवर्मन राजा कारणीभूत ठरला.
इथून काहीसं पुढं गेल्यावर आपल्याला अनेक लेणी लागतात. कृष्णानं गोवर्धन पर्वत उचलल्याची किंवा गोकुळात आपल्या मित्रांसोबत मजामस्ती करतानाची गोष्ट एका लेणीत कोरून ठेवली आहे. त्याच्यापुढं सत्तर-ऐंशी फुटांच्या भल्यामोठ्या दगडी भिंतीवर गंगावतरण शिल्प कोरलंय.
पण यात केवळ गंगा पृथ्वीवर अवतरत आहे, एवढचं कोरलं नाही तर त्या वेळी पृथ्वीवर काय काय घडत होतं, त्या भगीरथानं कसे प्रयत्न केले, भगवान शिवाची आराधना करणारे साधू आणि पृथ्वीवरील अनेक प्राणी हे त्या भव्यदिव्य शिल्पात अगदी जिवंत वाटावेत असे कोरले आहेत.
महिषासुरमर्दिनी लेणीमध्ये तर सिंहावर आरूढ झालेली दुर्गा आणि म्हैस आणि मनुष्य यांच्या मिश्ररूपात महिषासुराचं आठ-दहा फुटांचं शिल्प आपलं लक्ष वेधून घेतं. गणेश मंदिर, ब्रह्मा-विष्णू-महेश यांची छोटेखानी लेणी, एका दगडावर कोरलेले माकड, सिंह, हत्ती यांसारखे प्राणी हे सगळं पाहत आपण येऊन पोचतो वराह लेणीच्या समोर. या लेणीचं छत पूर्णपणे रंगवलेलं होतं. अजूनही त्याचे अवशेष आपल्याला दिसतात.
वराहनं आपल्या हातात भूदेवीला उचलल्याचं शिल्प अतिशय प्रमाण, सुंदर आणि आकर्षक आहे. या वराह लेणीच्या मागं, एक लाइटहाउस आपल्या नजरेस पडतं. ते ब्रिटिशांच्या काळात उभारण्यात आलं असलं, तरीही त्याच्याखाली पल्लवकालीन लेणी आपल्याला आढळतात. हे सगळं काही एकाच ठिकाणी, थोड्याफार फरकाचं अंतर ठेवून खोदण्यात आलं आहे. पाच रथ आणि इतर सर्व लेणी पाहायला आपल्याला कमीत कमी चारपाच तास निवांत हवेत.
महाबलीपुरमच्या समुद्रकिनाऱ्यावर एक अतिशय सुंदर मंदिर पल्लावांच्या काळात उभारण्यात आलंय. भौगोलिक स्थानामुळं या मंदिराला ‘Sea Shore’ किंवा शोर मंदिर म्हणून ओळखतात. या मंदिराच्या गर्भगृहात सोमस्कंदाची प्रतिमा आहे. शिव, पार्वती आणि कार्तिकेयच्या एकत्रित प्रतिमेला सोमस्कंद या नावानं ओळखण्यात येतं. मंदिराच्या बाहेर सिंहारूढ दुर्गा विराजमान आहे. सिंह हा पल्लावांच्या स्थापत्यातला अतिशय महत्त्वाचा घटक आहे.
नरसिंहवर्मन किंवा राजसिंहवर्मन यांच्या काळातील बांधकाम ओळखायला फार भारी सोय या दोघांनीच करून ठेवली आहे. ज्या मंदिर किंवा लेण्यातील खांबांच्या पायामध्ये बसलेल्या सिंहाचं शिल्प असेल तर ते नरसिंहवर्मनच्या काळातील आणि जर दोन पायांवर उभारलेला सिंह असेल, तर ती वास्तू राजसिंहवर्मनच्या काळातील आहे हे स्पष्टपणानं ओळखता येतं आणि मुख्यतः सर्व बांधीव मंदिरांची उभारणी ही राजसिंहवर्मनच्या काळात झाली आहे.
नरसिंहवर्मन पल्लवांच्या घराण्यातील फार ताकदवान राजा होऊन गेला. त्याचे वडील, महेंद्रवर्मन उत्तम नाटककार होते. स्वतःला ‘विचित्र चित्त’ या नावाने तो संबोधत असे. नरसिंह ऊर्फ मामल्लने बदामीवर आक्रमण केलं आणि पुलकेशी दुसरा चालुक्य याला हरवलं. पुलकेशी दुसरा दख्खन भागात होऊन गेलेला बलाढ्य राजा होता. कांचीवर आक्रमण करणं, आपल्या वडिलांना हरवणं यांसारख्या गोष्टींमुळे मामल्ल दुखावला गेला होता. त्यानं बदामीवर हल्ला केला, पुलकेशीला हरवलं आणि स्वतःला ‘वातापीकोंड’ अशी पदवी धारण केली.
कांचीपुरम, चेन्नई आणि पुदुचेरी या तिन्ही प्रसिद्ध स्थळांपासून महाबलीपुरम दीड-एक तासांच्या अंतरावर आहे. चौदाशे वर्ष जुन्या या गावामध्ये पल्लवांच्या वैभवशाली साम्राज्याच्या पाऊलखुणा सर्वत्र विखुरलेल्या आहेत. त्या पाहायला आणि तो इतिहास जगायला एकदातरी जायला हवं.
समुद्र सफरीचा आविष्कार!
- विशाखा बाग
नॉर्वेमध्ये फिरताना सतत तुम्हाला निसर्गाचा आविष्कार अनेक ठिकाणी अनुभवायला मिळतो. मोठ्या क्रूजवरून समुद्र सफरीचा आनंद अवर्णनीय होता. ‘ट्रॅव्हल बकेट लिस्ट’मधली माझी क्रूज टूर साकार झाल्याने मी प्रचंड खूश होते. नॉर्वेमध्ये फिरताना सतत तुम्हाला निसर्गाचा आविष्कार अनेक ठिकाणी अनुभवायला मिळतो.
समुद्रातून मोठ्या क्रूजवरून फिरण्याचं सुख काही औरच असते. रॉयल कॅरेबियनच्या क्रूजवरून समुद्रात फिरताना मिळणारा आनंद अवर्णनीय होता. आजूबाजूला पसरलेला अथांग निळाशार समुद्र, दूरवर दिसणारे डोंगर आणि अंगाला झोंबणारा थंडगार वारा ही सगळी मजा अनुभवातूनच येते. ‘ट्रॅव्हल बकेट लिस्ट’मध्ये असलेली माझी ही टूर प्रत्यक्षात साकार झालेली बघून मला प्रचंड आनंद होत होता... तेही एवढ्या मोठ्या क्रूजवर सात दिवस घालवता येणं म्हणजे मी स्वतःला खरं तर नशीबवान समजत होते.
रॉयल कॅरेबियन क्रूजला एकंदरीत १६ डेक. तिसऱ्या ते पंधराव्या डेकपर्यंत प्रत्येक ठिकाणी स्टेट रूम्स म्हणजेच राहण्याच्या खोल्या असतात. त्याशिवाय या सर्व डेकवर सर्व वयोगटातील पर्यटकांच्या करमणुकीसाठी नानाविध गोष्टीही उपलब्ध होत्या. त्यामध्ये तिसऱ्या डेकवर कॅसिनो आणि म्युझिक हॉल, चौथ्या आणि पाचव्या डेकवर दीड हजार जण बसू शकतील,
असे रॉयल थिएटर, पब्ज, रेस्टॉरंट आणि दुकानं, सहाव्या डेकवर लायब्ररी अन् चौदाव्यापासून सोळाव्या डेकपर्यंत पर्यटकांसाठी मौजमजेची रेलचेल. दोन मोठे स्विमिंग पूल, जाकुझी, मोठ्या टीव्ही स्क्रीन, ओपन स्काय बार आणि रेस्टॉरंट, डिस्को थिएटर, जॉगिंग ट्रॅक, स्पा, जिम आणि मुलांसाठी फुटबॉल ग्राऊंड, व्हिडीओ गेम एरिया, रॉक क्लाइंबिंग वॉल अशी एक नाही तर अनेक ठिकाणं मन रमवायला तिथे होती.
इंग्लंडहून निघाल्यानंतर नॉर्वेपर्यंत पोहोचण्यासाठी म्हणून पूर्ण दोन दिवस आपण फक्त नॉर्थ सी किंवा युरोपियन वॉटरमधून सेलिंग करत असतो आणि त्यामुळेच या सर्व सोयी-सुविधा पर्यटकांसाठी आवश्यक असतात. त्याशिवाय प्रत्येक ओपन डेकवर बसण्यासाठी म्हणून आरामदायी सोफे, खुर्च्या असतात. मला तरी तिथेच बसून निळ्याशार समुद्राकडे बघत पुस्तक वाचायला प्रचंड आवडत होतं आणि ती जागा मी पुस्तक वाचण्यासाठी म्हणून खरोखरच एन्जॉय केली. अथांग समुद्राकडे अनेक तास बघत बसलं तरीसुद्धा मन तृप्त होत नाही, हे मात्र खरं.
सकाळी उठून सोळाव्या डेकवरच्या जॉगिंग ट्रॅकवर समुद्र बघत एक तास फिरायचं आणि त्यानंतर चौदाव्या डेकवर पुन्हा समुद्राकडे बघतच मस्त कॉन्टिनेन्टल ब्रेकफास्ट करायचा, असा जवळपास आमचा सहा दिवसांचा कार्यक्रम ठरला होताच. अथांग पसरलेलं, स्वच्छ नितळ निळं पाणी, त्यावर पडलेली नॉर्वेजियन फिऑडस् म्हणजेच डोंगरांची प्रतिबिंब, डोंगरांच्या मधूनच पाण्यावर पडणाऱ्या सूर्यप्रकाशाची तिरीप हे दृश्य खरोखरच अविस्मरणीय होतं. नॉर्वेमध्ये फिरताना सतत तुम्हाला निसर्गाचा आविष्कार अनेक ठिकाणी अनुभवायला मिळतो.
बघता बघता आम्ही नॉर्वेपर्यंत येऊनसुद्धा पोहोचलो. आमचं पहिलं ठिकाण होतं नॉर्वेमधलं क्रिस्तियन सेंड हे समुद्राकाठी असलेलं निसर्गरम्य आणि सुबत्तापूर्ण गाव. रिसॉर्ट टाऊन म्हणूनही ते पर्यटकांमध्ये प्रसिद्ध आहे. गावाची अर्थव्यवस्था इथे असणाऱ्या मुख्यतः बियरच्या आणि आईस्क्रीमच्या फॅक्टरीवर अवलंबून आहे.
पर्यटनस्थळ असलेल्या या गावात ओपन एअर म्युझियम आहे जिथे साधारण पंधराव्या शतकापासून लोकवस्ती आणि त्यांची घरं कशी होती, हे दाखवलं आहे. मिनिएचर स्वरूपातील क्रिसियन सेंड हे गावसुद्धा इथे तुम्हाला बघायला मिळतं. आखीवरेखीव पद्धतीने वसवलेलं हे गाव पेस्टल कलरमधल्या लाकडी घरांसाठी प्रसिद्ध आहे. पुढचं नॉर्वेमधलं आमचं ठिकाण होतं ओलेसुंड नावाचं पोर्ट टाऊन.
हे गाव एक व्यापारी बंदर आहे; परंतु त्याचबरोबर इथे व्यापारी आणि मोठी मोठी प्रवासी जहाजसुद्धा येत असतात. अतिशय उत्तम आणि प्रचंड मोठा अन् सोयी-सुविधांनी सुसज्ज असा धक्का किंवा पोर्ट इथे जहाजांसाठी बांधलेलं आहे. मासेमारीसाठीसुद्धा प्रसिद्ध असलेल्या गावाची लोकसंख्या फक्त ६६ हजार आहे.
नॉर्वेचं अफलातून निसर्गसौंदर्य न्याहाळत आम्ही येऊन पोहोचलो फ्लाम या गावाला. आमचं क्रूज धक्क्याला लागल्या लागल्या हे गाव पाहून तर मी पहिल्याच नजरेत त्याच्या प्रेमात पडले. चारही बाजूंनी डोंगराच्या कुशीत असलेलं, इतक्या सुबक आणि शिस्तबद्ध रीतीने वसवलेलं हे टुमदार गाव एका स्वप्नातलंच वाटत होतं.
समुद्राच्या काठावर असलेल्या या गावात मोठी नदी आहे, नदीच्या आजूबाजूला मोठे रस्ते, बागा, झोपडीवजा असलेली मोठी लाकडी घरं, गावाच्याच मागे दिसणारे डोंगर आणि त्यामधून वाहणारे धबधबे, एका बाजूला लांब वर दिसणारी हिरवीगार कुरणं हे चित्र अजूनही डोळ्यासमोरून जात नाही. छोट्याशा असणाऱ्या या गावाची लोकसंख्या फक्त पाचशे आहे; पण दरवर्षी साडेचार लाख पर्यटक या गावात येत असतात.
हे गाव तर बघण्यासारखं आहेच; पण तुम्ही इथे वीस किलोमीटर लांब चालणाऱ्या फ्लाम सीनिक रेल्वेमध्ये बसून एक चक्करसुद्धा मारू शकता. दिवसभर अशा अनेक ठिकाणी फिरून आल्यानंतर संध्याकाळी क्रूजवर आपल्यासाठी वेगवेगळे म्युझिकल शो, ऑर्केस्ट्रा आणि मॅजिक शो यांसारख्या कार्यक्रमांची मेजवानी तयारच असते. हे सगळे कार्यक्रम आपल्या तिकिटामध्येच समाविष्ट असतात; परंतु त्यासाठी आपल्याला वेळेवर तिथे पोहोचावं लागतं.
स्विमिंग पूल, जाकुझी यांसारख्या गोष्टींची मजा तर आम्ही घेतलीच; पण इथे एक अफलातून गोष्ट आम्ही केली आणि ती म्हणजे क्लोज स्काय डायव्हिंग. स्काय डायव्हिंग सिम्युलेटरमध्ये एक विशिष्ट प्रकारचा सूट घालून आपण आतमध्ये जातो आणि वाऱ्याच्या प्रचंड झोतावर आकाशात तरंगल्याचा अनुभव घेतो. ॲडव्हेंचर स्पोर्टस् असणारी ही गोष्ट सगळेच जण करू शकतात, असं नाही.
क्रूजवरचे आमचे सात दिवस कसे भर्रकन निघून गेले हे कळलंसुद्धा नाही. नॉर्वेचं अनोखं निसर्गसौंदर्य पाहत आणि क्रूजची लक्झरी, उत्तम जेवण आणि करमणूक हे सगळं अनुभवत असतानाच पुन्हा एकदा इंग्लंडला येऊन पोहोचलो.
तुमच्याकडेसुद्धा युके आणि युरोप असे दोन्ही व्हिसा असतील, तर ही ट्रीप करायला तुम्हाला नक्कीच आवडेल. नॉर्वेचं निसर्गसौंदर्य अनुभवायला समुद्रावरची ही सफर करायलाच हवी.
gauribag7@gmail.com
मोटारींचं गाव
- वैभव वाळुंज
इंग्लंडमधील लहानशा गेडन गावाची एक अनोखी ओळख आहे. या गावाने गाड्यांचा इतिहास जीवापाड जपला आहे. या ठिकाणी जगप्रसिद्ध ‘ॲस्टन मार्टिन’, ‘जॅग्वार’ अन् ‘लॅण्डरोवर’ गाड्यांची निर्मिती करण्याचे कारखाने आहेत. जुन्या विंटेज गाड्यांचे मालक अनेकदा आपल्या गाड्या लोकांनी पाहाव्यात, यासाठी येथील संग्रहात लावून जातात.
गेडन हे इंग्लंडच्या वॉरिकशायर काऊंटीमधलं लहानसं गाव आपल्या निसर्गसौंदर्यासाठी आणि आसपास असणाऱ्या सैन्याच्या छावणीसाठी प्रसिद्ध आहे. मिडलँड या इंग्लंडच्या मध्यवर्ती भागातील काही गावांजवळ ब्रिटनमधील यादवी युद्धाची सांगता झाली होती, त्याच्याही काही पुरातन आठवणी येथे फुटकळ प्रमाणात टिकून आहेत; पण तरीही जागतिक अर्थव्यवस्थेच्या नकाशावर या गावाचं अस्तित्व ठळकपणे जाणवतं, त्याचं कारण म्हणजे या गावाला असणारा आणि त्यांनी जीवापाड जपलेला गाड्यांचा इतिहास.
ब्रिटनची ‘फॉर्म्युला वन’ गाड्यांची शर्यत होते ते ठिकाण म्हणजे सिल्वरस्टोन इथला जगप्रसिद्ध ट्रॅक. गेडन गावी होणाऱ्या गाड्यांच्या वार्षिक महोत्सवाला मी हजेरी लावली. सिल्वरस्टोन फेस्टिवल हा तीन दिवस चालणारा महोत्सव आपल्या आगळ्यावेगळ्या नियमांनी बांधलेल्या शर्यतींसाठी ओळखला जातो.
सहसा एकत्र पाहायला न मिळणाऱ्या गाड्या आपल्या बांधणी आणि जुळणीतील फरकांच्या पलीकडे जाऊन एकमेकांशी झुंजत असतात. एकामागोमाग एक वेगवेगळ्या गटांतील शर्यतींची रेलचेल या महोत्सवात दिसून येते. जगभरातील विविध देशांमधून आलेल्या नव्या गाड्या तसेच विविध शर्यतींमध्ये गाजलेल्या जुन्यापुराण्या कारदेखील या वर्षी शर्यतीत भाग घेत होत्या.
यंदा जमलेल्या लोकांमध्ये शेजारच्या गावात संग्रहालय पाहायला जाण्याचा बेत ठरला. मी गेडन गावाजवळ असणाऱ्या ब्रिटिश मोटर म्युझियम या संग्रहालयाला भेट दिली. इथे असलेला संग्रह हा जगभरातील ऐतिहासिक गाड्यांचा सर्वात मोठा साठा म्हणून शर्यतप्रेमींमध्ये प्रसिद्ध आहे.
समोर आधीच इतक्या शर्यती सुरू असताना मला पुन्हा लावलेल्या गाड्या पाहण्यात रस नव्हता. मात्र, गेडन गावाची जाहिरात करणाऱ्या व्यक्तींनी इथे भारतातील महाराजांच्या काही गाड्या असल्याची व त्यासोबतच सैन्याने वापरलेले रणगाडे भाडेतत्त्वावर देण्यासाठी ठेवण्यात आले असल्याची गोष्टही सांगितली.
भारतातील कोण्या राजाने आपल्या संस्थानात रस्ता झाकण्यासाठी ठेवलेल्या गाड्या आणि त्याचबरोबर ब्रिटिशांच्या ताब्यात असलेल्या बंगाल प्रांतात निर्यात केलेल्या आणि या महोत्सवाच्या निमित्ताने पुन्हा तेथे आलेल्या कार दिसणार असल्याची चर्चा सुरू झाली. हे ऐकल्यानंतर मात्र मी उत्साहाने या ठिकाणाला भेट देण्यासाठी सज्ज झालो.
अगदी लहानसं आणि इंग्लंडच्या ग्रामीण भागातील एका कोपऱ्यातलं गाव असतानाही या ठिकाणी जगप्रसिद्ध ‘ॲस्टन मार्टिन’ व ‘जॅग्वार’ आणि ‘लॅण्डरोवर’ या गाड्यांची निर्मिती करण्याचे कारखाने आहेत. सुरुवातीला शर्यतीसाठी प्रसिद्ध झालेल्या या गाड्यांनी नंतरच्या काळात प्रवासासाठीची साधने तसेच सैन्य आणि इतर विशेष वाहतुकीसाठी व शेतीसाठी गरजेची वाहनं या सर्वांचं उत्पादन करायलाही सुरुवात केली.
दुसऱ्या महायुद्धाच्या काळात जेव्हा तंत्रवैज्ञानिक प्रगती गतिमान झाली त्याच काळात गाड्यांचा वेग वाढता वाढू लागला आणि अनायसे इंग्लंडच्या याच भागामध्ये सिल्वरस्टोन हे शर्यतीचं ठिकाण म्हणून नावारूपाला आलं. साहजिकच गाड्यांची आवड असणारे लोक या ठिकाणाला भेट देऊ लागले आणि त्यातूनच जुन्या व नावाजलेल्या प्रसिद्ध गाड्या जतन करण्याची परंपरा सुरू झाली. तेव्हापासून इथल्या निसर्गरम्य वातावरणात गाड्यांचे गुरगुरणारे आवाज नेहमीचे बनून राहिले.
अर्थात या ठिकाणाला संग्रहालय असं नाव असलं तरी जुन्या, थोडक्यात पडलेल्या गाड्या येथे असतील असे समजू नका. इथे असणाऱ्या जवळपास सर्वच्या सर्व जुन्या गाड्या या चालत्या स्थितीत आहेत आणि वेळोवेळी त्यांना शर्यतीत भाग घेण्यासाठी बाहेर काढलं जातं. अगदी दीडशे वर्षांपूर्वीच्या गाड्याही आपल्या मूळ स्वरूपात जतन करून त्यांची दुरुस्ती करून वापरायला काढल्या जातात.
अशा अतिमहागड्या गाड्यांचा शौक असणाऱ्या लोकांना त्या दाखवण्याचीही हौस असते. त्यामुळे जुन्या विंटेज गाड्यांचे मालक अनेकदा आपल्या गाड्या लोकांनी पाहाव्यात, यासाठी या संग्रहात लावून जातात व वेगवेगळ्या मोटर्स आणि रॅलीसाठी गरज पडेल तेव्हा त्या परत नेतात. म्हणूनच वर्षात केव्हाही गेलं तरी या संग्रहालयात काही गोष्टी नव्याने अनुभवास येतात.
इतिहासाच्या वेगवेगळ्या टप्प्यांवर गाड्या कशा बदलत गेल्या, तंत्र आणि विज्ञान यांच्यातील प्रगतीनुसार गाड्यांसोबतच त्यांच्याविषयीचे कायदे आणि त्यांचा वापर करणारी माणसे यांच्यात कोणते बदल झाले, वेगवेगळ्या व्यवसायांत असणाऱ्या लोकांनी गाड्यांना आपापल्या आवडीनुसार कसं स्वरूप दिलं, तसेच गरज आणि चंगळवाद या दोघांच्या मिश्रणातून एक वेगळीच जागतिक संस्कृती आणि छंद कसे तयार झाले, याचा अनुभव येतो.
भारत व पाकिस्तान वगळता जगाच्या इतर भागांमध्ये रेडिओ प्रसारणासाठी उदार कायदे असल्यामुळे इंग्लंडच्या या भागात छंदिष्ट माणसांनी गाड्यांसाठी माहिती सांगणारी विशेष रेडिओ केंद्रे बनवली आहेत. त्यावरून सातत्याने गावात नव्याने येणाऱ्या गाड्यांची माहिती प्रसारित केली जाते, तसेच आसपास घडणाऱ्या शर्यतींचं समालोचनही केलं जातं.
आता वाहन व्यवसाय हा फार क्लिष्ट आणि एकाच कारागिराची मक्तेदारी न राहता जगभरातील हजारो-लाखो ‘फोर्डोत्तर’ कामगारांमध्ये विभागला गेला आहे. असं असतानाही विज्ञानाच्या प्रगतीला हातभार लावण्याचं काम, सुदूर प्रयत्नांतून का होईना, गाड्यांच्या माध्यमातून केलं जात आहे.
vaiwalunj@gmail.com
भागीरथी : समूह चार शिखरांचा
उत्तराखंड राज्यातील गढवाल हिमालय म्हणजे नंदनवनच. इथं वसलेली शिखरं नितांत सुंदर आहेत. विस्तीर्ण पसरलेली, हिमाची दुलई पांघरलेली, कोवळ्या सोनकिरणांना कवेत घेणारी ही शिखरं भारताच्या वैभवशाली इतिहासाची, जडणघडणीची साक्ष देतात. त्यांचं भौगोलिक महत्त्व हे देखील वादातीत आहे. या शिखरांमधील एक आघाडीचं नाव म्हणजे भागीरथी.
स्वर्गातून पृथ्वीवर गंगा आणणारा राजा म्हणजे भगीरथ, सूर्यवंशी घराण्यातील या राजाच्या नावावरून जो पर्वत समूह ओळखला जातो तो भागीरथी. हा मुळात चार शिखरांचा समूह आहे. भागीरथी -एक (६८५६ मीटर), भागीरथी - दोन (६५१२ मीटर), भागीरथी-तीन (६४५४ मीटर) व भागीरथी -चार (६१९३ मीटर) अशी या शिखरांची नावं. ही सर्व शिखरं चारही बाजूनं विविध ग्लेशियर्स म्हणजे हिमनद्यांनी वेढलेली आहेत.
पूर्वेला वासुकी, पश्चिमेला गंगोत्री, दक्षिणेला स्वच्छंद तर उत्तरेला चतुरंगी अशी चार ग्लेशियर्स आहेत. यातील गंगोत्री ग्लेशियर हे सर्वांत मोठं. या ग्लेशियर मधूनच पुढं गोमुख तयार होतं व तेथून सुरू होते भागीरथी नदी, जी पुढं जवळपास पाचशे किलोमीटरचा प्रवास करून देवप्रयागला अलकनंदा नदीशी एकरूप होते अन् गंगामातेचे रूप धारण करते.
सियाचीननंतर आशिया खंडातील सर्वांत मोठं ग्लेशियर अशी ओळख असलेलं गंगोत्री ग्लेशियर हे भागीरथी व अर्थात गंगा नदीचं मुख्य स्रोत आहे. हे संपूर्ण ग्लेशियर भागीरथी पर्वत समूहाचं विस्तारित रूप वाटावं एवढं एकरूप झालेलं आहे, म्हणूनच कदाचित या ग्लेयशीरमधून उगम पावणाऱ्या नदीला भागीरथी हे नाव दिलं गेलं असावं. भागीरथी शिखर समूह व गंगोत्री ग्लेशियर परस्परपूरक आहेत असं माझं मत आहे.
सहा हजार मीटरहून उंच असलेली चार शिखरं आजूबाजूला उभी असल्यानं गंगोत्री ग्लेशियर विस्तीर्ण असं रूप धारण करू शकलं, जे पुढे २५ कोटींहून अधिक लोकांची जीवनदायिनी असलेल्या गंगा नदीचं मुख्य स्रोत बनलं. मी गेल्या पाच दशकांत अनेक वेळा गंगोत्री येथे गेलो आहे. ग्लेशियरचं बदलणारं रूप मी अनुभवतो आहे. काही दशकांपूर्वी डोळ्यात न सामावणारे गंगोत्री हळूहळू विरळ होताना दिसतं आहे, त्यामुळे भागीरथी शिखर समूह तुलनेने जवळ आल्याचा भासतो.
भागीरथी पर्वत समूह व आजूबाजूचा परिसर हा अत्यंत पवित्र मानला जातो. तपोवन परिसर हा अनादी काळापासून ऋषीमुनींच्या तपश्चर्येचं आद्य ठिकाण म्हणून ओळखलं जातं. आजही मी जेव्हा तपोवनला जातो, तेव्हा विविध साधू, ऋषी अत्यंत विपरीत हवामानामध्येही दृढ निश्चयानं आपला ध्यास पूर्णत्वास नेताना दिसतात.
या परिसरात गेल्यावर वाटणारी प्रसन्नता ही कदाचित तिथं असणाऱ्या हवेत वर्षानुवर्षे रुळलेली आहे, असं मला नेहमी वाटतं. मी जेव्हा मोहिमेसाठी या परिसरात जातो, तेव्हा येथे असणारी प्रसन्नता व सकारात्मकता मला पूर्ण मोहिमेसाठी शिदोरी म्हणून कामी येते, असा माझा अनुभव आहे.
गिर्यारोहणाच्या दृष्टीनं देखील भागीरथी शिखर समूह हा नावाजलेला आहे. भागीरथी - एक पासून भागीरथी- चारपर्यंत चारही शिखरांवर चढाई करणं तसं तांत्रिकदृष्ट्या अवघड आहे. यात पहिल्या शिखरावर चढाई करताना गिर्यारोहकांचा जास्त कस लागतो. १९८० मध्ये जपानच्या क्योटो विद्यापीठाच्या संघानं दक्षिण-पूर्व धारेनं शिखरावर पहिल्यांदा यशस्वी चढाई केली. यांत तब्बल दोन हजार मीटर चढाई ही तंत्रशुद्ध कौशल्य पणाला लावणारी बाब होती.
आजही भागीरथी-एक या शिखरावर चढाई करण्यासाठी अगदी मोजक्याच गिर्यारोहकांचे पाय वळतात, कारण येथील काठिण्य पातळी. त्या मानानं भागीरथी-दोन हे शिखर गिर्यारोहकांना लवकर आपलंस करतं, असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. कारण, ६५१२ मीटर उंच असलेल्या या शिखरावर गिर्यारोहकांचा राबता तुलनेनं जास्त आहे. गिरिप्रेमीच्या विविध संघानी आतापर्यंत तीन वेळा भागीरथी-दोन या शिखरावर यशस्वी चढाई केली आहे.
या शिखरावर पहिली यशस्वी चढाई झाली ती तब्बल नऊ दशकांपूर्वी. १९३३ मध्ये, जेव्हा गिर्यारोहण हे फारसं रुळलं देखील नव्हतं तेव्हा ऑस्ट्रियन गिर्यारोहक द्वयी असलेल्या एडी एलमॉथलर व टोनी मेसनर यांनी विजयी झेंडा भागीरथी-दोन शिखरावर फडकविला होता. त्याच वर्षी ब्रिटिश जोडगोळी कोलिन किर्कस व चार्ल्स वॉरेन यांनी ६४५४ मीटर उंच असलेल्या भागीरथी-तीन शिखरावर चढाई यशस्वी केली.
त्यामानाने भागीरथी-चार हे शिखर तसं दुर्लक्षित राहिलं. उंचीनं कमी असलं तरी सतत बदलणारं हवामान, तीव्र चढाई मार्ग यांमुळं पहिला यशस्वी समिट अटेम्प्ट आला तो तब्बल २००९ मध्ये, जेव्हा स्लोव्हेनियन गिर्यारोहक रॉक ब्लॅगस, लूज लिंदीच व मार्को प्रॅझॉज यांनी शिखर चढाई यशस्वी केली. याआधी भागीरथी-चार हे शिखर चढण्यासाठी सिल्व्हो कारो व मॅटजॅझ जामनिक यांनी तब्बल ११ अयशस्वी प्रयत्न केले. मात्र त्यांना शिखरमाथ्यानं नेहमी हुलकावणी दिली.
भागीरथी शिखर समूह हा अत्यंत सुंदर अशा शिखरांनी वेढलेला आहे. एका बाजूला वासुकीसारखा बलाढ्य पर्वत तर दुसऱ्या बाजूला शिवलिंगसारखं मनमोहक शिखर. आम्ही जेव्हा गढवाल हिमालयातील शिखर मोहिमांवर जातो, तेव्हा भागीरथीच्या चार शिखरांचं दर्शन ठरलेलं. शिवलिंग शिखर चढाई करताना कॅम्प एकच्या वर गेल्यावर पूर्वेला दिसणारी व सकाळच्या कोवळ्या उन्हात न्हालेली चार टोकं, अर्थात भागीरथी शिखरं ही आम्हाला वेगळीच ऊर्जा देतात.
गिर्यारोहणच नव्हे तर गढवाल हिमालयात तपोवन असो, भोजबासा ट्रेक करताना भागीरथी शिखर मन मोहून टाकतात. या परिसरात येणारे गिर्यारोहक असो वा भाविक यात्रेकरू, भागीरथी पर्वत समूह बघून हरखून जातात, त्याच्या समोर नतमस्तक होतात.
निसर्गाचं सुंदर रूप अनुभवण्यासाठी, आपल्या देवदेवतांच्या इतिहासातील घटनांची साक्ष अनुभवण्यासाठी, जीवनदायिनी गंगामातेच्या उगमासाठी कारणीभूत असलेल्या भागीरथी शिखरांना एकदा तरी ‘याची देही याची डोळा’ बघायला हवं.
अजिंठ्याचं सुवर्णयुग
references to fact creation of caves sculptures and paintings at Ajanta during Vakataka Satavahana HarishenaSakal
अजिंठा इथल्या गुहा, त्यांतली शिल्पं आणि चित्रं यांची निर्मिती वाकाटक, सातवाहन, हरिशेन यांसारख्या अनेक राजवटींमध्ये सुरू झाली अशा स्वरूपाचे संदर्भ आढळून येतात.
‘आर्किऑलॉजिकल सर्व्हे ऑफ इंडिया’च्या अभ्यासानुसार, साधारणतः आठशे वर्षं लेण्यांच्या निर्मितीचं काम या वेगवेगळ्या कालखंडांत झालं. लेण्यांची निर्मिती केल्यानंतर शिल्पनिर्मिती व सर्वात शेवटी चित्रांची निर्मिती करण्यात आली.
लेणी क्रमांक १० ची निर्मिती सर्वात प्रथम झाली असा अंदाज आहे. मात्र, याबाबत कुठंही नेमक्या लिखित नोंदी उपलब्ध नाहीत. सर्वसाधारणपणे राजा आणि राजघराण्याच्या कालखंडानुसार लेण्यांच्या निर्मितीचा काळ सांगितला जातो.
त्या काळातल्या संदर्भांनुसार अजिंठा हे ‘सिल्क रूट’वरचं महत्त्वाचं ठिकाण असल्याचे उल्लेख सापडतात. या ‘सिल्क रूट’वरून अफगाणिस्तानापर्यंत जाण्याचे मार्ग होते. या मार्गानं त्या काळात व्यापार चालत असे व वस्तूंची देवाणघेवाण होत असे.
अजिंठा लेण्यांची जागा ही अतिशय सुंदर निसर्ग असलेली आहे. या लेण्यांच्या शेजारून वाघोरा नावाची नदी वाहते, त्यामुळं पर्यटनासाठी ही जागा अतिशय महत्त्वाची होती. या ठिकाणचा जो डोंगर आहे तो बेसॉल्ट या दगडाचा आहे. या दगडाच्या टॉपोग्राफीचा अभ्यास करून दोन हजार वर्षांपूर्वी छिन्नी व हातोडी यांच्या साह्यानं लेण्यांची निर्मिती झाली.
त्या काळात दगड फोडणारे उत्तम कारागीर, वास्तुरचनाकार, चित्रकार, शिल्पकार आदींनी एकत्रितरीत्या हे काम केलेलं आहे. या सर्व कलाकारांनी प्रत्यक्षात त्या त्या काळात उपस्थित असलेल्या गोष्टीच चित्रित केलेल्या आहेत. अजिंठा ‘जातककथे’त कोणत्याही प्रकारची वेगळी फँटसी किंवा चित्रकाराच्या कल्पनेतलं चित्रण आपल्याला बघायला मिळत नाही. जे चित्रित केलं गेलं आहे ते त्या काळात अस्तित्वात होतं.
जागतिक दर्जाचं, हजारो वर्षं टिकणारं काम आपण करत आहोत याची त्या प्रत्येकाला जाणीव होती, असं म्हणता येईल. जे दिसतं, जसं दिसतं तसंच चित्रात रंगवणं यांत त्यांची खासियत होती. त्यामुळं या सर्व चित्रकलेत वास्तुकला, वेशभूषा, अलंकरण यांसारखे अनेक विषय सूक्ष्मतेनं रेखाटलेले आढळतात.
अजिंठा इथं ३० गुंफा असून क्रमांक १, २, ९, १०, १६, १७ या चित्रे असलेल्या प्रमुख लेण्या असून, बाकी काही लेण्यांमध्ये भिंतीवर किंवा छतावर चित्रे काढलेली, रेखाटनं केलेली आढळतात.
प्राचीन भारतीय संस्कृतीमधले चित्रकलेचे संदर्भ शोधताना अजिंठ्याचं सुवर्णयुग मोठ्या दिमाखात समोर येतं. प्रचंड अंधाऱ्या गुहेनं जपून ठेवलेली ही चित्रं अभ्यासण्यासाठी लेणी क्रमांक १ मधल्या ‘महाजनक/जातक’ या मोठ्या आकाराच्या चित्राची चर्चा या सदरातून करू.
‘राजा जनक राजेशाही जीवनाचा त्याग करण्याची कल्पना मांडतो,’ हा विषय चित्रकारांनी चितारताना ते या घटनेचे जणू काही प्रत्यक्ष साक्षीदारच असावेत असं आरेखनाच्या बारकाव्यांवरून वाटत राहतं.
निसर्गसहवासात वनात राहिलेला राजा अनेक दिवसांनंतर दरबारात येणार म्हणून त्याच्या स्वागतासाठी संगीत-नृत्याचा कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला आहे...प्रत्येक कलाकार आपापलं कौशल्य सादर करत आहेत...दोन तरुणी बासरीसह असून,
दोन तरुणी टाळ वाजवून नाद निर्माण करत आहेत...दोन तरुणी चर्मवाद्य वाजवत असून, एका तरुणीच्या हाती तंतुवाद्य आहे. एक सुंदर नर्तिका आपलं नृत्यकौशल्य दाखवत आहे. हा संगीताचा अभूतपूर्व सोहळा राजा बसलेल्या दरबारासमोरच्या जागेत एका भव्य छताखाली साजरा होत आहे.
त्याचं छत पिवळसर रंगाचं असून त्यावर अनेक त्रिमितीय चौकोनी कोनाडे आहेत. बाहेरच्या दृश्यभागावर काळसर रंगानं, उलट्या पताका असाव्यात, तशी नक्षी चितारलेली आहे. या चित्रात त्या काळातली वास्तुरचना आपल्याला अनुभवता येते. वास्तुरचनेतलं छत चारही कोपऱ्यांवर असलेल्या स्तंभावर पेललेलं आहे.
चित्रातल्या वास्तुरचनेनुसार छताच्या खाली व स्तंभाच्या आत संगीतकार्यक्रम सुरू आहे; असं असायला पाहिजे होतं; परंतु प्रत्यक्षात मात्र उभ्या स्तंभामुळं दृश्य झाकलं जातं. ते रेखाटण्यासाठी व्यत्यय येतो, तसंच दृश्याचं सौंदर्य कमी व्हायला नको; म्हणून तो स्तंभासमोरच्या बाजूस चितारला नाही.
हे चित्रकारानं घेतलेलं मोठं कल्पक स्वातंत्र्य आहे; पण ही संकल्पना चित्रातलं सौंदर्य वाढवणारी असून विषयासाठी सूचक असावी किंवा अगोदर संगीतसमारोहाचं चित्रण झालं असावं आणि नंतर वास्तूची, छताची रचना चित्रित केलेली असावी. परिणामी, स्तंभ चितारण्यास जागा उरली नसावी, असाही अंदाज करता येतो.
चित्रकारानं वाद्यवृंद वर्तुळाकार आकृतिबंधात चितारला आहे. संपूर्ण चित्रात सर्व वादकांना (Conductor) मार्गदर्शन करणारा कुणीही संगीतदिग्दर्शक नाही. सर्व संगीतवादक गोलाकार बसून एकमेकांच्या साथीनं ताला-सुरात वाद्य वाजवत आहेत व त्या गोलाकार रचनेच्या आत नर्तिका नितांतसुंदर नृत्य-अदा पेश करत आहे.
सगळेच वादक उभे राहून वाजवत असते तर नर्तिकेवर ओव्हरलॅप होऊन रसभंग झाला असता. नर्तिका वादकांच्या मागं झाकली गेली असती म्हणून तिच्यासमोरचे वादक जमिनीवर बसलेले आहेत व बाकीचे उजवीकडं-डावीकडं उभे राहून वादन करत आहेत.
सूरवाद्यं-नादवाद्यं-तालवाद्यं यांचा सुंदर मेळ या चित्रात दिसत आहे. हे सगळं जिवंत सादरीकरण आहे, म्हणून दोन्ही बासरीवादकांनी डाव्या कमरेत एकाच वेळी वाकून चर्मवाद्याचा ठेका घेतला, असं प्रत्यक्ष दिसतं, तर मान थोडी डावीकडं तिरकी करून बासरीची बाजू जमिनीला समांतर न जाता वरच्या बाजूस अधिक उचलून बासरीतून दीर्घ व वरच्या टिपेचा सूर लावला गेला आहे. म्हणजे, आवाजाची पातळी अधिक आहे, असं दिसतं.
त्यासाठी अधिक श्वास घेऊन तो नियंत्रित करण्यावर त्यांचं कौशल्य जाणवतं. नजरेच्या रोखावरून ते आपल्या सुरावर एकाग्र होत आहेत, असं दिसून येतं. चर्मवाद्यांचा आवाज अधिक असल्यामुळं टाळ वाजवणाऱ्या वादकांनी टाळ कमरेजवळ न धरता काहीसा वर,
कानांजवळ धरला आहे. इतर वाद्यांच्या आवाजात त्याचा आवाज यावा किंवा त्याची आवर्तनसंख्या (वाजवण्याची गती) जास्त असावी. आपल्या संगीतात तल्लीन असलेला असा हा वाद्यवृंद. प्रत्येक जण आपापल्या कामात आहे. आपल्या कामातून आनंद घेत आहे आणि देतही आहे...
रंगसंगती वाद्य-त्यांचं वेगळेपण, त्यांचा आकार, आधुनिकता, वाद्य वाजवण्याच्या पद्धती अशा कितीतरी बाबी त्या काळच्या समाजजीवनात राजाश्रयाला होत्या, याचा हा समृद्ध पुरावा आहे.
भारतीय वाद्यप्रकारांत बासरी व टाळ समाविष्ट आहेत; परंतु इथं चर्मवाद्य हे ढोलक नसून Bongo- ड्रम या प्रकारचं वाद्य - जे आज आपल्याला आफ्रिकी जमातीत दिसून येतं - तसं वाद्य इथं आहे. हे वाद्य ढोलकासारखं जमिनीवर आडवं ठेवून न वाजवलं जाता उभ्या अवस्थेत वापरलं जातं.
हे वाद्य आकाराच्या व आवाजाच्या पातळीनुसार धीरगंभीर अथवा कर्कश आवाजाच्या पातळीत मिळतं. चित्रात हे वाद्य वाजवणारी व्यक्ती राहणीमान, शारीरिक देहयष्टी, तसंच गडद रंगकांती व वेशभूषेवरून आफ्रिकी वंशातली आहे असं प्रत्यक्षात दिसतं.
प्रश्न पुढंच आहे : अजिंठ्यातले चित्रकार आफ्रिकेत जाऊन हा संगीतप्रकार बघून आले होते की आफ्रिकेतल्या वाद्यवृंदानं अजिंठ्यात संगीतसमारोह केला? याच स्वागत-संगीतकार्यक्रमात राजा जनक याचं मन रमत नव्हतं; हे दरबारात कुजबुज झाल्यामुळं राणीच्या लक्षात आलं; म्हणून राणी शिवली हिनं राजाला प्रश्न विचारला. इथून पुढं जातककथा सुरू होते...
(लेखक हे रिसर्च फोटोग्राफर व रिस्टोरेशन आर्टिस्ट, तसंच ‘अजिंठा कलासंस्कृती’चे प्रतिनिधी आणि राज्य शासनाच्या ‘सांस्कृतिक धोरण समिती’चे सदस्य आहेत.)
अजिंठ्याचं सुवर्णयुग (भाग २)
‘महाजनक जातक’ या चित्राच्या आरेखनाची वैशिष्ट्यं गेल्या वेळच्या भागात आपण पाहिली. याच चित्रातल्या रंगसंगतीविषयी आता जाणून घेऊ.
‘महाजनक जातक’ या चित्रातल्या रंगसंगतीचे काही नमुने उपलब्ध झाले आहेत. त्या चित्रनिर्मितीतल्या रंगच्छटा (ग्रेडेशन) संख्येनं फार नसून कमी छटांमध्ये काम केलं गेलं आहे. बराच भाग हा तेजस्वी उजळ रंगात रंगवला गेला होता.
त्यातला काहीच भाग शिल्लक आहे, तर काळाच्या ओघात काही भाग पुसट झाला आहे. विषयानुसार उजळ-गडद रंग वापरून चित्रात लेव्हल्स निर्माण केल्या गेल्या आहेत. राजवाड्याचं छत, गावाच्या वेशीवरची नक्षी यांत उजळ रंगामुळं वेगळेपण जाणवतं, तर राजा मुनींच्या आश्रमात आला आहे हे दाखवताना मुनींचं वस्त्र उजळ दाखवून चित्रकारानं लक्ष वेधलं आहे. यातून मुनींच्या व्यक्तिरेखेची आकर्षकता आणि पावित्र्य दर्शवण्याचा प्रयत्न केला गेला आहे असं वाटतं.
घनतेच्या जागी गडद रंगाचा वापर करण्यात आला आहे. ठळकपणे विषय दर्शवताना चित्रात छटेतला विरोधाभास प्रभावीपणे मांडला गेला आहे. बुद्धिबळातल्या पटाप्रमाणे नक्षी हे त्यातलं उदाहरण आहे.
इथं उजळ-गडद तपकिरी, पिवळा, हिरवा व निळा या रंगांच्या छटा प्रकर्षानं जाणवतात. या चित्रातला हा भाग काळाच्या ओघात फिकट झाला आहे...त्यातले बरेच गडद रंग विरले आहेत. मात्र, उजळ रंगातला पार्श्वभाग (सर्फेस) मात्र शाबूत आहे. त्यावर रंगांचं ब्रशिंग बघायला मिळतं. चित्रकामात खूप मोठ्या आकारातल्या जाड ब्रशचा वापर केला गेला असावा असं वाटत नाही. खूप लांब स्ट्रोकचा वापर फारसा आढळत नाही. असं असलं तरी, रंग काही ठिकाणी पारदर्शक, तर काही ठिकाणी अपारदर्शक इफेक्टचा आभास निर्माण करतात.
रंगकामात ब्रशचा योग्य आकार व त्यावर दाब देऊन त्याच्या वाढलेल्या जाडीचा उपयोग करून सुंदर रेषांची, आकारांची मांडणी केली गेली आहे. गावाची वेस/सीमाद्वार हे मानवनिर्मित बांधकाम निसर्गातल्या पाना-फुलांत सामावलं जावं यासाठी तिथं रंगच्छटा हिरवी वापरण्यात आली आहे. राजदरबारात निळसर रंग राजाची श्रीमंती दाखवणारा आहे असं वाटतं.
अजिंठ्यात चितारलेला हा निळा रंग महत्त्वाच्या ठिकाणी जपून वापरला गेला आहे. चौथ्या भागांतल्या प्रसंगात राजा वेशीबाहेर जात असतानाच्या वेळी रक्षकांच्या समूहात मात्र हिरव्या रंगाचा घोडा पाहायला मिळतो.
राजा जनक किती समृद्ध होता याचं चित्रण चित्रकारानं केलं आहे. भव्य मोठा प्रासाद...उत्तम, सौंदर्यपूर्ण वास्तुरचना... कलात्मक निर्मिती, दुर्मिळ व मौल्यवान विविधरंगी दगडांचा वापर...दगडांची गोलाकार-लंबगोलाकार-दंडगोलाकार-चौकोनी-आयताकृती आकारांची रचना...उंचीचे स्तर, त्यांवरची नक्षी हे सगळं रेखीव व वास्तव आहे. या वास्तूंच्या रेखांकनामुळं त्या काळातलं वास्तूतलं वेगळेपण, प्रचलित कारागीरकौशल्य, साहित्य आदींची उपलब्धता दिसून येते.
वास्तूच्या बाह्य सौंदर्याप्रमाणेच अंतर्गत रचनाही खूप सुंदर आहे. स्तंभ व त्यावरील सुंदर त्रिमितीय नक्षी, तीवर मौल्यवान धातूंचं आलंकरण, छतावर लोंबणाऱ्या मोत्यांच्या सरींचं तोरण, छताच्या कोपरावर शिल्पाकृती, पडवीवर नक्षी अशी कलात्मक समृद्धी दिसते.
आजच्या काळातल्या वास्तुरचनेत जे आधुनिक घटक महत्त्वाचे मानले जातात; त्या दृश्यकलांच्या घटकांचा वास्तुकलेत महत्त्वपूर्ण सहभाग असतो. या सर्व घटकांच्या गुंफणीतून कलाकृतीत गुणवैशिष्ट्यं निर्माण होतात व ती या चित्रातल्या वास्तूला रचनात्मक सौंदर्य प्रदान करतात.
वास्तूची उंची, रुंदी, लांबी यांबरोबरच खिडक्या, दारं, स्तंभ, कमानी, तुळई आदी अनेक वास्तुघटक या चित्रात चितारण्यात आलेले आहेत. याशिवाय, अंतर्गत सजावटीचाही भाग इथं दिसतो. राजा महाजनक याच्या भव्य प्रासादात वरील सर्व प्रकारचे घटक पाहायला मिळतात.
बहुपर्णी कमानी, चबुतरे, चौकोनी किंवा गोलाकार स्तंभरचना, पाषाणी छज्जे, सूक्ष्म नक्षीकाम केलेल्या संगमरवरी जाळ्या, भव्य अवकाशरचना, भिंतीवरच्या गिलाव्यात केलेलं जडावकाम या विविध वास्तुघटकांमुळे, त्यांच्या संयोजनामुळे
राजप्रासादाच्या निर्मितीला लाभणारा खास भारतीय शैलीचा भव्यपणा, तसंच गावाची वेस व तीवरची कमान, कमानीवरची चौकटीची नक्षी पाहायला मिळते.
अजिंठ्यातल्या अद्भुत वेशभूषा हा दोन हजार वर्षांपासूनच कौतुकाचा विषय आहे. याचं प्रमुख कारण हेच आहे की, आजही त्यातली मिळती-जुळती वेशभूषा आजूबाजूला बघायला मिळते. त्यातली नक्षी, आकार, आरेखन, अमूर्त-मूर्त आवर्तनं यांचा भास सातत्यानं होत असतो. ही सर्व चित्रवैशिष्ट्यं पाहता, अजिंठा इथल्या लेण्यांमधली चित्रं आणि शिल्पं हा भारतीय समाजासाठी कलेच्या दृष्टीनं महत्त्वाचा आशय ठरतो.
(लेखक हे रिसर्च फोटोग्राफर व रिस्टोरेशन आर्टिस्ट, तसंच ‘अजिंठा कलासंस्कृती’चे प्रतिनिधी आणि राज्य शासनाच्या ‘सांस्कृतिक धोरण समिती’चे सदस्य आहेत.)
विदेशी संशोधकाचा ध्यास लेण्यांचा
Obsessed with foreign explorers of caves historical place archeological sectorSakal
- केतन पुरी
आपण बऱ्याच ठिकाणी हे ऐकत आलोय, की एखाद्या लेणीची निर्मिती चार-पाचशे वर्ष सुरू होती, किंवा एखाद्या मंदिरांची निर्मिती होण्यासाठी हजार वर्ष लागली. पण तुम्हाला सांगितलं, की एखाद्या लेणीची निर्मिती केवळ काही वर्षांमध्ये झाली आहे, तर त्यावर विश्वास ठेवणं आपल्याला काहीसं कठीण जाईल.
पण हे पुराव्यानिशी सिद्ध करून दाखवलं एका विदेशी व्यक्तीनं. एक संशोधक भारतात येतो. इथल्या अत्युत्कृष्ट गोष्टीच्या प्रेमात पडतो. तब्बल ६५ वर्षे फक्त एकच ध्यास... एकच ध्येय... अजिंठा..! आपल्या देशाच्या संशोधन क्षेत्रातील मैलाचा दगड मानलं जाणारं संशोधन ज्यांनी केलं, ज्यांच्या अभ्यास आणि अध्ययनामुळं इतिहासाचा अभ्यासक्रम बदलला.
अजिंठ्याच्या लेणींचा आणि त्या अनुषंगानं महाराष्ट्रातील इतरही लेणींचा दुर्लक्षित आणि काळाच्या ओघात विस्मृतीत गेलेला इतिहास ज्यांनी अथक परिश्रमानं समोर आणला, ते महान संशोधक वॉल्टर स्पिंक. अविश्वसनीय वाटावं असं काम त्यांनी आपल्या संशोधनाद्वारे जगासमोर मांडलं.
अजिंठ्याच्या सर्वांत प्रसिद्ध लेणींची निर्मिती केवळ १८-२० वर्षांमध्ये झाली असल्याची गोष्ट पुराव्यासहित त्यांनी सिद्ध केली आहे, तब्बल अडीच हजारपेक्षा जास्त पानांमधून. त्यांनी केलेल्या संशोधनामुळे फक्त अजिंठाच नाही तर डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या मागं असणाऱ्या लेणी, वेरुळ, घारापुरी लेणींच्या निर्मिती काळाची सुद्धा पुनर्मांडणी करावी लागली.
त्यांचं संशोधन, आकलन आणि मांडणी यांविषयी आपण या लेखमालेतून समजून घेऊच. त्या आधी, अजिंठ्याच्या लेणींमागं असणाऱ्या निर्मात्यांचा इतिहास आणि त्यांचा शासनकाळ समजून घेण्याची गरज आहे.
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात असणाऱ्या अजिंठा आणि वेरुळच्या लेणी जगप्रसिद्ध आहेत. जागतिक वारसास्थळांच्या यादीत असणाऱ्या या लेणींना दरवर्षी लाखोंच्या संख्येनं देशी-विदेशी पर्यटक भेट देतात. बऱ्यापैकी लोकांचा हा गैरसमज असतो, की अजिंठा आणि वेरुळ हे फार जवळ आहेत. पण, जिल्ह्याचं ठिकाण असणाऱ्या छत्रपती संभाजीनगरपासून वेरुळ केवळ तीस किलोमीटर अंतरावर आहे आणि अजिंठा विरुद्ध दिशेला शंभर किलोमीटर अंतरावर आहे.
जिल्ह्याच्या ठिकाणावरून अजिंठ्याला जाण्यासाठी बस तसंच स्थानिक वाहतूक करणाऱ्या गाड्यांच्या साहाय्यानं सहजपणे पोचता येईल. अजिंठा लेणींच्या वाहनतळापासून शटल सेवा कार्यरत असून लेणींपर्यंत जाण्याची सोय उपलब्ध आहे.
अजिंठ्याचा शोध फार रोमांचक पद्धतीनं लागला. खरेतर शोध म्हणताना आपण एका गोष्टीकडं लक्ष दिलं पाहिजे. भारतातील कित्येक ऐतिहासिक वास्तू कोणत्या ना कोणत्या मार्गानं कायम लोकसमूहाच्या संपर्कात राहिल्या.
ज्या वास्तू शतकानुशतके जमिनीखाली किंवा मातीच्या ढिगाऱ्याखाली दबल्या, त्या उत्खननाच्या माध्यमातून पुरातत्त्व संशोधकांनी समोर आणल्या. पण काही वास्तू काळाच्या ओघात विस्मृतीत गेल्या.
लोकांचं दुर्लक्ष झालं किंवा इतर काही कारणांमुळं त्या वास्तू लोकसंपर्कापासून दूर गेल्या. अपघातानं किंवा अथक संशोधकीय प्रयत्नांमुळं त्या पुन्हा एकदा जगासमोर आल्या. त्याला आपण शोध म्हणण्यापेक्षा पुनर्प्रकाश वगैरे शब्दांमध्ये बांधू शकतो. पण, त्या वास्तूंचं अस्तित्व कित्येक शतकांत पहिल्यांदा लोकांसमोर आल्यामुळं आपण ‘शोध’ सारखे शब्द वापरतो. असो.
अजिंठ्याच्या डोंगररांगेत शिकार सुरू होती. उन्हाळ्याचे दिवस होते. वाघाचा माग काढत काढत ही मंडळी वाघूर नदीच्या जवळ जाऊन पोचली. नदीच्या वरच्या बाजूला एक भलीमोठी गुहा त्यांना दिसली. शिकार करायला आलेल्या समूहात ब्रिटिश सैन्यातील घोडदळाचा अधिकारी जॉन स्मिथ सुद्धा होता. हातात मशाली घेऊन हे सगळे त्या गुहेत घुसले.
आतमध्ये गेल्यावर मात्र त्यानं वेगळंच विश्व दिसलं. वेगवेगळ्या रंगांनी रंगवलेली चित्रे, भलेमोठे खांब, मध्यभागी स्तूप आणि अजून खूप काही काही. हे सगळं बघून स्मिथ हरखून गेला. त्या लेणीमध्ये त्याने आपलं नाव लिहून ठेवलं. John A. Smith, २८ APRIL १८१९. अचानकपणे भारताच्या इतिहासातील सर्वोत्कृष्ट कलाकृती जगासमोर उजेडात आली.
अपघातानं का होईना पण या लेणी समोर आल्या. वणव्यासारखी ही गोष्ट पसरत गेली. नितांत सुंदर निसर्गाचा वरदहस्त लाभलेल्या या लेणींच्या दर्शनासाठी कित्येक लोकांचे येणं जाणं सुरू झालं. त्यावेळेस भारतात फार मोठी राजकीय उलथापालथ सुरू होती. मराठ्यांचं स्वतंत्र अस्तित्व संपुष्टात आलं होतं. इंग्रज हळूहळू संपूर्ण भारतावर वर्चस्व प्रस्थापित करत होते. त्यातच अजिंठ्याच्या लेणी प्रकाशात आल्या.
लंडनपर्यंत लेणींची चर्चा पोचली होती. तिथून एक चित्रकार भारतात आला. मेजर रॉबर्ट गिल. उत्तम चित्रकार. रॉयल एशियाटिक सोसायटीने एक महत्त्वाकांक्षी प्रकल्प सुरू केला होता. अजिंठा लेणीतील चित्रांच्या प्रतिकृती निर्माण करण्याचा मानस होता.
त्यासाठी रॉबर्ट गिल अजिंठ्याला आला. चैत्यगृह, विहार यांच्यासोबत भिंतीवर काढलेल्या चित्रांच्या प्रतिकृती सुद्धा तयार करण्यात येणार होत्या. लेणींच्या जवळ असणाऱ्या गावामधून नैसर्गिक रंगसुद्धा तयार करण्यात आले होते.
लेणींची शक्य तेवढी साफसफाई करण्यात आली होती. तिथपर्यंत जायला पायऱ्यांची डागडुजी करण्यात आली. गिलनं जवळपास ३० चित्र तयार केली. सन १८६६ मध्ये लंडनच्या ‘द क्रिस्टल पॅलेस’ मध्ये ही चित्रं प्रदर्शनासाठी लावण्यात आली होती.
दुर्दैव पाहा, गिलनं तयार केलेल्या २९ चित्रांपैकी २५ चित्रं आगीत जळून खाक झाली. त्यानंतर एक चित्रसुद्धा असंच जळालं. गिलने काढलेली आणि अपघातातून सुरक्षित राहिलेली उर्वरित चार चित्रे ‘व्हिक्टोरिया अँड अल्बर्ट म्युझियम’ येथे ठेवण्यात आली.
गिल आणि पारो यांची प्रेमकथा आजही अजिंठा गावातील लोकांच्या मनात जिवंत आहे. अजिंठ्याला पहिल्यांदा जगाच्या कलामंचावर नेणारा हा महान कलाकार आजही महाराष्ट्रातील भुसावळ येथे चिरनिद्रा घेत आहे.
पण या लेणींची खरी निर्मिती कधी झाली ? याचे कलाकार कोण ? या लेणींचा काळ कसा ठरवला गेला ? अजिंठ्याचे जन्मदाते कोण ? या प्रश्नांची उत्तरं शोधणं गरजेचं आहे. भारतातील सर्वांत वैभवशाली आणि श्रीमंत घराण्यांपैकी एक म्हणून वाकाटक इतिहासात प्रसिद्ध आहे.
अनेक अभ्यासक आणि संशोधक वाकाटकांच्या कारकीर्दीला भारताचे सुवर्णयुग म्हणून संबोधतात. या राजघराण्याच्या दोन शाखा होत्या. एक नागपूरजवळ असणाऱ्या ‘नंदीवर्धन’ ऊर्फ ‘नगरधन’ येथील तर दुसरी ‘वस्तगुल्म’ ऊर्फ ‘वाशीम’ शाखा. नगरधन शाखेतील रुद्रसेन, प्रभावती गुप्तसारख्या प्रभावी व्यक्तिरेखा होऊन गेल्या. महाराष्ट्रातील सर्वांत सुरुवातीच्या मंदिरांपैकी काही मंदिरांची निर्मिती याच राजघराण्यानं केली. दुसरीकडं, वत्सगुल्म शाखेत फार महत्त्वाचा प्रसंग घडणार होता.
सम्राट हरिषेन गादीवर बसला होता. त्याच्या अधिपत्याखाली असणाऱ्या कलाकारांची नजर पडली एका सुंदर भागावर... हरिषेनच्या आधी, तब्बल तीनशे वर्ष आधी काही लेणी त्या डोंगरावर खोदल्या होत्या.
एका सुंदर जगाची निर्मिती करायला कलाकार डोंगराच्या पायथ्याला येऊन उभे होते. अजिंठ्याच्या अद्भुत लेणींची निर्मिती व्हायला सुरवात होणार होती... पण हा हरिषेन आणि त्याचे प्रतिस्पर्धी असणारे लेणीचे निर्माते कोण ? जाणून घेऊ या पुढच्या भागात...
देवांचं शिखर
14 highest peak of himalaya naga parvat geographical place trekkers climbersSakal
- उमेश झिरपे
हिमालय सर्वदूर पसरलेला आहे. भारताच्या वायव्येला काराकोरम पर्वतरांगेपासून ते थेट ईशान्येतील अरुणाचल प्रदेशपर्यंत. हिमालयातील एक-एक शिखरं किंवा शिखरसमूह ही पीएचडीचा विषय आहेत, एवढं वैविध्य इथे आहे. अष्ट हजारी शिखरं, म्हणजेच ज्यांची उंची ही आठ हजार मीटरपेक्षा अधिक आहे, अशी शिखरं जगात फक्त हिमालयात आहेत.
एकदोन नव्हे तर तब्बल चौदा ! या चौदांपैकी पाच शिखरं ही भारताच्या अतिउत्तरेला असलेल्या काश्मीरमध्ये, जो सध्या अनधिकृतपणे पाकिस्तानच्या ताब्यात आहे इथे आहेत. ज्याला आपण पाकिस्तानव्याप्त काश्मीर असं म्हणतो. येथे के-२, नंगा पर्बत, ब्रॉड पीक, गशेरब्रुम-१ व गशेरब्रुम २ अशी पाच अष्ट हजारी शिखरं आहेत. यातील प्रत्येक शिखरांचं वैशिष्ट्य अन् वैविध्य वेगळं आहे. यातील एक शिखर म्हणजे नंगा पर्बत!
या शिखराचं नंगा पर्बत असं नामकरण झालं ते इथल्या भौगोलिक परिस्थितीमुळे. इतक्या उंचीवर असलेल्या शिखरांवर सहसा हिमाचा थर असतो, मग तो ऋतू कोणताही असो. इथं मात्र परिस्थिती वेगळी आहे. नंगा पर्बत एका अगदी काटकोनात उभा राहावा असा पर्वत आहे.
ज्या टेक्टॉनिक प्लेट्स, ज्या धडकेमुळे हिमालय पर्वताची निर्मिती झाली, त्याचे ठळक पुरावे इथे दिसतात. शिखराचा वरचा भाग हा ग्रॅनाइटने बनलेला आहे. इथं सहसा हिम साचत नाही, म्हणून दगडी कातळ पर्वत उघड्या डोळ्यांनी दिसतो.
इतर पर्वतांच्या तुलनेत हे शिखर उघडं भासतं, म्हणून यांचं बोली भाषेतील नाव पडलं, नंगा पर्बत, ते तसंच पुढे इंग्रजीत देखील रूढ झालं. स्थानिकांसाठी हा पर्वत शिखर देवासमान आहे. याला ते देओमीर असं म्हणतात, ज्याचा अर्थ होतो देवांचं शिखर!
नावापासून वेगळेपण असलेला हा पर्वत पाकिस्तानव्याप्त काश्मीरमध्ये गिलगिट-बाल्टीस्थान येथे असलेल्या हिमालयाच्या अतिउत्तरेकडील भागामध्ये वसलेला आहे. ८१२६ मीटर उंच असलेले हे शिखर उंचीनुसार जगातील नववे शिखर आहे.
कोणत्याही मोसमामध्ये चढाईसाठी अत्यंत कठीण शिखर म्हणून नंगा पर्बतचा लौकिक आहे. १८९५ पासून, म्हणजे जेव्हापासून हा शिखरपर्वत चढण्याचे प्रयत्न करण्यास सुरवात झाली, तेव्हापासून या शिखरावर अनेक गिर्यारोहकांचे मृत्यू झाले, म्हणून गिर्यारोहक जगतामध्ये माउंट नंगा पर्बत हा मृत्यू पर्बत म्हणून देखील ओळखला जातो.
या पर्वत शिखरावर चढाई करताना अत्यंत कठीण रिज अर्थात कड्यांवरून किंवा ८० ते ९० अंश कोनातील बर्फ व दगडांनी व्यापलेल्या कठीण भिंतींवरून चढाई करावी लागते. गिर्यारोहकांसाठी नंगा पर्बत हे नेहमीच मोठं आव्हान ठरला आहे.
रेन्हॉल्ड मेसनर (जगातील सर्व १४ अष्टहजारी शिखर मोहिमा यशस्वी करणारा पहिला गिर्यारोहक) व त्याचा भाऊ गुंतूर मेसनर यांनी नंगा पर्बत चढताना रुपाल फेस या मार्गाचा वापर केला, मात्र उतरताना हवामान कमालीचं खराब झाल्यानं ममरी रिजहून उतरण्यास सुरवात केली.
मात्र, ममरी रिजच्या तीव्रतेमुळे व सततच्या हिमप्रपातामुळे गुंतूर मेसनर यांना जीव गमवावा लागला. त्यानंतर २०१३ मध्ये नार्दीने फ्रेंच गिर्यारोहक एलिझाबेथ रेव्होलच्या साथीनं याच मार्गानं चढाईचा प्रयत्न केला होता, जो असफल ठरला. नंगा पर्बत शिखराची चढाई आहेच अशी आव्हानात्मक !
नंगा पर्बत शिखराचा रुपाल फेस हा प्रसिद्ध आहे. जवळपास ४ हजार ६०० मीटर उंच असलेला फेस हा जगातील सर्वांत मोठा ‘रॉकफॉल फेस’ आहे. सरळसोट उभ्या ग्रॅनाइटच्या भिंतीमुळे तुलनेने कमी हिम असतो, असलाच तर तो टणक प्रकारातील असतो. या सरळ दगडी भिंतीच्या खाली विस्तीर्ण पसरलेलं ग्लेशियर आहे.
त्यामुळं गिर्यारोहक जेव्हा इथे चढाई करतात, तेव्हा त्यांचा कस लागतोच, मात्र आजूबाजूला दिसणारं दृश्य हे डोळे दिपवणारे असतं, असं गिर्यारोहक सांगतात. भौगोलिकदृष्ट्या नंगा पर्बतचं वैविध्य हे अलौकिक आहे, हे तेवढंच खरं.
नंगा पर्बत शिखराशी गिर्यारोहण क्षेत्राची एक कटू आठवण जोडली गेली आहे. हे पर्वत शिखर पाकव्याप्त काश्मीरमध्ये असलेल्या इतर चार शिखरांपेक्षा थोडंसं पश्चिम दिशेला आहे. तुलनेने मानवी वस्ती येथील बेस कॅम्पहून जवळ आहे.
हा संपूर्ण परिसर सुरक्षेच्या दृष्टीने थोडासा अस्थिर आहे. २०१३ साली जून महिन्यात जेव्हा या शिखरावर चढाई मोहीम चालू होती, तेव्हा बेस कॅम्पवर चीन, स्लोव्हेकिया, नेपाळ, युक्रेन, लुथेनिया इत्यादी देशांतील १० हून अधिक गिर्यारोहक होते व सोबतीला स्थानिक गाइड देखील होते.
मोहीम चालू असताना पोलिसांच्या वेशात काही लोक येथे आले व त्यांनी सर्व गिर्यारोहकांवर प्रश्नांची सरबत्ती केली. गिर्यारोहक काहीही म्हणो, त्या लोकांनी सर्व गिर्यारोहकांना बांधलं व नंतर एक-एक करून सगळ्यांना मारून टाकले.
असं कृत्य करणारी लोकं ही पाकिस्तान-तालिबान संघटनेचे दहशतवादी होते. आंतरराष्ट्रीय गिर्यारोहकांना मारून जगाचं लक्ष त्यांना वेधून घ्यायचं होतं. या घटनेत १० गिर्यारोहकांचा व एका स्थानिक गाइडचा मृत्यू झाला.
संपूर्ण गिर्यारोहण जगतासाठी हा खूप मोठा धक्का होता. गिर्यारोहकांची सुरक्षा व पाकव्यात काश्मीरची अस्थिर परिस्थिती यामुळं पुन्हा चर्चिली गेली. या घटनेचा परिणाम इतका आहे, की आजही पाकव्याप्त काश्मीरमध्ये गिर्यारोहणासाठी जाणाऱ्या गिर्यारोहकांची संख्या ही नेपाळ अथवा भारतीय हिमालयाला भेट देणाऱ्या गिर्यारोहकांपेक्षा लक्षणीयरित्या कमी आहे.
पाकव्याप्त काश्मीरमध्ये असल्यानं इथं जाण्यास भारतीय गिर्यारोहकांना अर्थातच बंदी आहे. येत्या काळात जर काही राजकीय बदल घडले तर कदाचित भारतीय गिर्यारोहक देखील आपल्या हक्काच्या शिखरांवर चढाई करू शकतील.
नंगा पर्बतचं नाव, त्याचं रूप, त्याची चढाई, त्याचा इतिहास, त्याचा भूगोल अन् त्याचं भविष्य हे सर्वच काही वेगळं आहे. या पर्वताच्या दर्शनासाठी जेव्हा संधी मिळेल, तेव्हा माझ्यासारखा गिर्यारोहक नक्कीच चुकवणार नाही.
(लेखक हे ज्येष्ठ गिर्यारोहक असून अखिल महाराष्ट्र गिर्यारोहक महासंघाचे अध्यक्ष आहेत.)
दाट धुक्याने वेढलेल्या रघुवीर घाटाने पांघरला 'हिरवा शालू'; निसर्ग सौंदर्यात 27 हून अधिक धबधब्यांची भर
मुसळधार पावसामुळे कोसळणाऱ्या दरडी रोखण्यासाठी घाटात ७ ठिकाणी संरक्षक भिंती उभारण्यात आल्या आहेत. यासाठी ७ कोटी रुपयांचा खर्च करण्यात आला आहे.
खेड : निरव शांतता, सह्याद्रीच्या अभेद्य कडेकपारीतून फेसाळणाऱ्या जलप्रपातांचा आवाज, थंड वातावरण, सोबतीला मुसळधार पाऊस अन दाट धुक्याने वेढलेल्या रघुवीर घाटाने (Raghuveer Ghat) हिरवा शालू पांघरला आहे. निसर्गाचा अविष्कार पाहण्यासाठी जणू सादच घालत असून पावसामुळे या घाटात निसर्गाने मुक्त हस्ताने केलेली उधळण पाहण्यासाठी व चिंब भिजण्यासाठी पर्यटकांची पावले रघुवीर घाटाकडे वळू लागली आहेत.
तालुक्यापासून खोपी येथे सुमारे ३२ किमी अंतरावर असलेला रघुवीर घाट पावसाळ्यातील पर्यटकांचे एक नवे ''डेस्टिनेशन'' ठरत आहे. शिंदी व सातारा (Satara) या जिल्ह्यांना जोडणारा हा घाट म्हणजे दळणवळणातील एक महत्त्वाचा टप्पा आहे. समुद्र सपाटीपासून सुमारे ७६० मीटर उंच, तर लांबी १४ किमी आहे.
या घाटात पावसाळ्यात तर जणू स्वर्गच उतरल्याचा अनुभव अनेकांना येतो. दाट धुक्यांमुळे डोंगर माथ्यावर उतरलेले ढग, कड्याकपारीतून वाहणारे लहान मोठे धबधबे हे पर्यटकांना जणू काही आव्हानच देत असतात. एका बाजूला खोल दऱ्या आणि दुसऱ्या बाजूला सह्याद्रीच्या उत्तुंग पर्वतरांगामध्ये फेसाळत कोसळणारे २७ हून अधिक धबधब्यांबरोबरच दाट धुके अन् नीरव शांततेची पर्यटकांवर मोहिनीच पडते. त्यामुळे या घाटाचे ''गारुड'' आजही पर्यटकांच्या मना मनावर कायम आहे.
गावे सातारा जिल्ह्यात
कांदाटी खोऱ्यातील शिंदी, वळवण, उचाट, चकदेव, बन, निवळी, वाघावळे, म्हाळुंगे, सालोशी, कांदाट, अकल्पे, मोरणी आदी १४ गावे सातारा जिल्ह्यातील महाबळेश्वर तालुक्यात जोडली असली तरी रघुवीर घाटच दळणवळणाचा मुख्य मार्ग आहे. त्यामुळे हा घाट पावसाळ्यात निसर्गाचे वेगळेच लेणं घेऊन पर्यटकांच्या स्वागतासाठी उभाच असतो.
दरडींचा धोका कायम
मुसळधार पावसामुळे कोसळणाऱ्या दरडी रोखण्यासाठी घाटात ७ ठिकाणी संरक्षक भिंती उभारण्यात आल्या आहेत. यासाठी ७ कोटी रुपयांचा खर्च करण्यात आला आहे. धबधबेही प्रवाहित झाल्याने पर्यटकांची पावले आता घाटाकडे वळू लागली आहेत. असे जरी असले तरी घाटात दरडी कोसळण्याचा धोका मात्र कायम आहे.
अमरनाथला जाताय? प्रवास सुखकर होण्यासाठी 'या' प्रकारचे कपडे तुमच्या बॅगेत नक्की ठेवा.!
Amarnath Yatra 2024 : भारतातील प्रसिद्ध तीर्थक्षेत्र 'बाबा बर्फानी' अर्थात अमरनाथ यात्रेला नुकतीच सुरूवात झाली आहे. महादेवाचे भक्त वर्षभर या यात्रेची आतुरतेने वाट पाहत असतात. ही अमरनाथ यात्रा अतिशय खडतर मानली जाते.
जम्मू आणि काश्मीर राज्यातील अनंतनाग जिल्ह्यात बाबा बर्फानी स्थित आहे. या ठिकाणाची उंची समुद्रसपाटीपासून सुमारे ३,८८८ मीट आहे. या यात्रेचा प्रवास अतिशय कठीण मानला जातो.
या यात्रेसाठी यात्रेकरूंची तब्येत चांगली असणे आवश्यक आहे. कारण, येथील थंड वातावरण, उंचावर असलेले ठिकाण आणि कठीण मार्गासाठी तुम्ही शारिरीक आणि मानसिकरित्या मजबूत असणे आवश्यक आहे.
अमरनाथ यात्रेकरूंच्या सुरक्षिततेसाठी आणि सोयीसाठी भारत सरकार आणि विविध गैर-सरकारी संस्था वैद्यकीय शिबिरे, हेलिकॉप्टर सेवा आणि इतर सुविधांसह विविध प्रकारची व्यवस्था करतात.
या सर्व गोष्टी असूनही तुम्ही त्या ठिकाणी जाण्यापूर्वी तुमची कपड्यांची आणि इतर आवश्यक गोष्टींची नीट तयारी करणे महत्वाचे आहे. यंदाच्या वर्षी तुम्ही देखील अमरनाथ यात्रेला जाणार असाल तर पॅकिंग करताना काही गोष्टी लक्षात ठेवा. तिथे जाताना तुम्ही काही खास कपडे सोबत ठेवणे खूप गरजेचे आहे.
लोकरीचे कपडे
अमरनाथ यात्रेदरम्यान अनेक वेळा तापमान खूपच खाली जाते. या तापमानात सतत बदल होत असतात. त्यामुळे, अशा परिस्थितमध्ये तुम्ही लोकरीचे कपडे सोबत ठेवा. चांगल्या लोकरीचे कपडे आधीच खरेदी करा. तिथे जाऊन असे कपडे खरेदी करण्यात तुमचे अधिक पैसे खर्च होतील. त्यामुळे, लोकरीचे ऊबदार कपडे, शॉल, मफलर, स्टोल इत्यादी गोष्टी बॅगेत ठेवायला विसरू नका.
रेनकोट सोबत ठेवा
सध्या देशातील अनेक भागांमध्ये पावसाने दमदार हजेरी लावली आहे. अमरनाथ यात्रेला पाऊस-थंडी यांचा ऊन-सावलीचा खेळ सतत सुरू असतो. त्यामुळे, थंडीसाठी आवश्यक ऊबदार कपडे सोबत ठेवताना तुम्ही रेनकोट देखील अवश्य सोबत ठेवा.
कारण, अमरनाथ यात्रेच्या प्रवासात कधी ही पाऊस पडू शकतो. त्यामुळे, तुमच्या मापाचा आणि परफेक्ट फिटिंगचा रेनकोट अवश्य सोबत ठेवा. जेणेकरून तुमचा पावसापासून बचाव होऊ शकेल.
हातमोजे आणि टोपी
अमरनाथ यात्रेला जाण्यापूर्वी बॅगेत स्वेटर, मफलर, हातमोजे, लोकरची टोपी अवश्य सोबत ठेवा. यामुळे, तुमचे थंडीपासून संरक्षण होऊ शकेल. हातमोजे अजिबात विसरू नका. कारण, तिथल्या थंड वातावरणामुळे हात गोठायला सुरूवात होते, त्यामुळे, त्यापासून संरक्षण करण्यासाठी लोकरीच्या हातमोजे अवश्य सोबत ठेवा.
बंद गळ्याचे कपडे
अमरनाथ येथील तापमान अतिशय कमी आहे. त्यामुळे, अशा स्थितीमध्ये तुम्ही बंद गळ्याचे कपडे अवश्य सोबत ठेवा. या बंद गळ्याच्या कपड्यांमुळे तुम्हाला थंडी जाणवणार नाही.
आळंदीच्या वारीला आहे जुनी परंपरा; आळंदीला कसं पोहोचाल अन् काय पहाल?
how to reach Shree Dnyaneshwar Maharaj Samadhi Mandir in Alandi history travel ashadhi wari know all details
आषाढाची चाहूल लागताच मनाला ओढ लागते ती पंढरीच्या विठुरायाचं सावळे रूप पाहण्याची, त्याला भेटण्याची, त्याचं दर्शन घेण्याची. वारी ही एक घटना नसून तो एक सोहळा असतो. हा सोहळा अनुभवन्यासाठी प्रत्येक वारकरी चालू लागतो पंढरीच्या दिशेने. पण अनेकांना पंढरीला जाणं शक्य होत नाही. त्यामुळे पांडुरंगाचे अनेक भक्त संत ज्ञानेश्वर माऊलींच्या भेटीला आळंदीला येत असतात. तर तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत. आळंदीत पाहण्यासारखं काय आहे? आळंदीला पोहोचायचं कसं?आणि आळंदीचा नेमका इतिहास काय आहे.
पायी आषाढी वारीसाठी संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा परंपरेने ज्येष्ठ वद्य अष्टमीला (२९ जून) आळंदीतून पंढरपूरकडे प्रस्थान करणार आहे. सोहळा १६ जुलैला पंढरीत पोचणार असून, मुख्य आषाढी एकादशी १७ जुलैला आहे.
श्री तीर्थक्षेत्र आळंदी महाराष्ट्रातील प्रसिद्ध संत ज्ञानेश्वर यांचे आळंदी हे समाधिस्थान आहे. संत ज्ञानेश्वरांनी आपल्या जीवनातील काही काळ येथे व्यतीत केला. या आळंदी गावाला “देवाची आळंदी” असे म्हणतात. ही देवाची आळंदी पुण्यापासून पंचवीस किलोमीटरवर आहे.
वारकरी संप्रदयात आळंदीला मोठे महत्त्व आहे. आळंदी हे शहर इंद्रायणी नदीच्या तीरावर वसलेले आहे. ज्ञानेश्वरांनी वयाच्या एकविसाव्या वर्षी येथे १२१८ साली समाधी घेतली. त्या जागी एक सुंदर समाधिमंदिर बांधण्यात आले. आषाढ महिन्यातील एकादशीला आळंदीहून निघून पंढरपूरला ज्ञानेश्वरांची पालखी जाते. या पालखीसोबत लाखो वारकरी अंदाजे २१६ किमी अंतर पायी चालत पंढरपूरला विठोबाच्या दर्शनासाठी जातात.
तर आळंदीचा इतिहास काय आहे?
चांगदेव नावाचे एक ज्येष्ठ योगी ज्ञानेश्वर महाराजांना भेटायला वाघावर बसून आले होते. त्यावेळी ज्ञानेश्वर आपल्या भावंडांसमवेत एका भिंतीवर बसून ऊस खात होते. चांगदेवाची भेट घेण्यासाठी ज्ञानेश्वरांनी त्या भिंतीलाच चालवत नेले अशी आख्यायिका आहे. ती भिंत आळंदीला आहे.
तुम्हाला आळंदीला राहायचं असेल तर तिथं अनेक धर्मशाळादेखील उपलब्ध आहेत. तसेच, इतर प्रेक्षणीय स्थळेदेखील आहेत. त्यांना तुम्ही भेट देऊ शकता.
आळंदीतील इतर प्रेक्षणीय स्थळे
इंद्रायणी नदी
कृष्ण मंदिर
मुक्ताई मंदिर
राम मंदिर
विठ्ठल रखुमाई मंदिर
स्वामी हरिहरेंद्र मठ
छत्रपती संभाजी महाराज समाधी, तुळापूर
जोग महाराज वारकरी शिक्षण संस्था
आळंदीतील धर्मशाळा
देविदास धर्मशाळा गोपाळपूर
फ्रुटवाले धर्मशाळा प्रदक्षिणा रोड
घासवाले धर्मशाळा प्रदक्षिणा रोड
मुक्ताबाई धर्मशाळा प्रदक्षिणा रोड
माहेश्वरी धर्मशाळा प्रदक्षिणा रोड
आगरी धर्मशाळा भिंतीजवळ वडगांव रोड
डबेवाले धर्मशाळा भिंतीजवळ वडगांव रोड
हरिहर महाराज धर्मशाळा भिंतीजवळ वडगांव रोड
विठ्ठल बाबा देशमुख धर्मशाळा वडगांव रोड
पाषाणकर धर्मशाळा
माई धर्मशाळा प्रदक्षिणा रोड
संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराज व जगद्गुरू श्री तुकाराम महाराज पालखीनिमित्त प्रस्थान सोहळ्यास पुणे शहर, उपनगरे व संपूर्ण राज्यभरातून आळंदी आणि देहूत अनेक वारकरी उपस्थित असतात.
तुम्हालाही आळंदीला जायचं झाल्यास तुम्ही कसं जाल?
आळंदीला जाण्यासाठी सर्वात स्वस्त प्रवास हा ट्रेनचा आहे. कोल्हापूरमधून यायचं झाल्यास. कोल्हापूर ते आळंदी थेट ट्रेन आहे.
नाशिकवरुन यायंच झाल्यास बस, कार असे अनेक पर्याय उपलब्ध आहेत. बसने आलात तर फक्त 40 मिनिटात आळंदीला याल. तर कारने आलात तर, नाशिक फाट्यावरुन 13 मिनिटात आळंदीला पोहचाल.
मुंबई वरुन आळंदीला पोहचण्यासाठी २ तासाचा कालावधी लागतो. मुंबई- खोपोली-कामशेत-पिंपरी चिंचवड यामार्गाने तुम्ही आळंदीला येऊ शकता.
पुणे ते आळंदी ही सर्वात स्वस्त ट्रेन ५१४३५ पुणे सातारा पॅसेंजर आहे. या गाडीला पुण्याहून आळंदीला जाण्यासाठी ३९ मिनिटे लागतात. ही ट्रेन पुण्याहून 18:10:00 वाजता निघते आणि 18:49:00 वाजता आळंदीला पोहोचते.
पावसाळ्यात फिरायला जाण्यापूर्वी 'या' गोष्टींची घ्या खास काळजी, तुमची ट्रीप होईल अविस्मरणीय.!
Monsoon Travel Tips : देशातील काही भागांमध्ये पावसाने दमदार हजेरी लावली आहे. महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्ये मुसळधार तर काही ठिकाणी रिमझिम पाऊस पडत आहे. या पावसामध्ये चहा आणि गरमागरम भज्यांचा हमखास आस्वाद घेतला जातो. या दिवसांमध्ये निसर्ग जणू हिरवी चादर पांघरतो. त्यामुळे, निसर्गाचा हा नजारा पाहण्यासारखा असतो. अनेकांना पावसाळ्यात फिरायला जायला आवडते.
या दिवसांमध्ये तुम्ही देखील फिरायला जाण्याचा प्लॅन करत असाल तर काही महत्वाच्या गोष्टींची काळजी घेणे, गरजेचे आहे. जेणेकरून तुमच्या प्रवासात कोणताही अडथळा येणार नाही, आणि तुम्हाला तुमच्या ट्रीपचा छान आनंद घेता येईल. पावसाळ्यात सहलीचे नियोजन करताना कोणत्या गोष्टी लक्षात ठेवायला हव्यात? चला तर मग जाणून घेऊयात.
हवामानाबद्दल घ्या माहिती
पावसाळ्यात तुम्ही ज्या ठिकाणी फिरायला जाणार आहात, तेथील मार्गावर किंवा आसपासच्या ठिकाणांचे हवामान कसे आहे? याची माहिती अवश्य घ्या. फिरायला जाण्यापूर्वी तिथल्या परिस्थितीचा आणि हवामानाचा अंदाज घ्यायला विसरू नका.
यामुळे, प्रवासादरम्यान तुम्ही कुठेही अडकणार नाही. या शिवाय, तुमच्या आणि तुमच्यासोबत येणाऱ्या लोकांच्या सुरक्षेसाठी ही माहिती घेणे महत्वाचे आहे. त्यामुळे. फिरायला जाण्यापूर्वी हवामानाची माहिती अवश्य घ्या.
छत्री सोबत ठेवा
पावसाळ्यात वातावरण कधी बदलेल हे सांगता येत नाही. जसे की, पावसाळ्यात ढग कधी बरसतील याची शाश्वती कधीच नसते. त्यामुळे, घरातून बाहेर पडण्यापूर्वी छत्री अवश्य सोबत ठेवा.
कारण, कधी ही पाऊस पडू शकतो आणि छत्रीची कधी ही गरज भासू शकते. त्यामुळे, छत्री कॅरी करायला विसरू नका. तुम्हाला हवे असल्यास तुम्ही छत्रीसोबतच रेनकोटही सोबत ठेवू शकता. यामुळे, पावसात भिजण्यापासून तुमची सुटका होऊ शकेल.
योग्य कपडे आणि फूटवेअर
पावसाळ्यात वातावरणात भरपूर आर्द्रता असते. त्यामुळे, आपल्याला खूप घाम येतो. त्यामुळे, पावसाळ्यात फिरायला जाण्यापूर्वी असे कपडे सोबत ठेवा की, ज्यामध्ये तुम्हाला गरम होणार नाही आणि कपडे ओले झाले तर ते सहज सुकतील. तसेच, कपड्यांसोबत असे शूज ठेवा, जे या दिवसांमध्ये सहज सुकतील. शिवाय, तुमचे पाय सुरक्षित राहतील. शक्यतो असे फूटवेअर सोबत ठेवा की जे चालताना सहजासहजी घसरणार नाहीत.
वॉटरप्रूफ बॅग सोबत ठेवा
सध्या पावसाळ्याचे दिवस आहेत. त्यामुळे, फिरायला जाण्यापूर्वी तुमचे कपडे किंवा तुमचे इतर सामान नेहमी वॉटरप्रूफ बॅगमध्ये ठेवा. यामुळे, तुम्ही पावसात भिजलात तरी तुमचे सामान सुरक्षित राहिल. तसेच, सोबत काही लहान प्लॅस्टिकच्या झिपलॉक पिशव्या ही ठेवा. जेणेकरून तुम्ही तुमचे पाकिट आणि मोबाईल त्यामध्ये सुरक्षित ठेवू शकता.
गर्दीपासून दूर विरंगुळा म्हणून वेळ घालवण्यासाठीचे उत्तम ठिकाण अंजीरले
अर्चना कदम
थोडा विसावा म्हणून आम्ही दरवर्षी उन्हाळ्याच्या व दिवाळीच्या सुट्ट्यांमध्ये सहलीचे नियोजन करतो. यावर्षी आम्ही बहीण भावंडांनी आपल्या कुटुंबियांसोबत कोकणला जायच ठरवल. तसेही समुद्राचे वेड प्रत्येकाला असतच. म्हणून आम्ही रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली तालुक्यात अंजीरले हे छोटेसे गाव निवडले. शहरापासून दूर, शांत, निवांत, गर्दीपासून दूर विरंगुळा म्हणून वेळ घालवण्यासाठीचे उत्तम असे ठिकाण म्हणजे म्हणजे अंजीरले. तरीही, मुलांना वाटले, एवढे बाकीचे सगळे बीच सोडून या छोट्याशा गावात आपण का जात आहोत. या प्रश्नाचे उत्तर त्यांना त्या ठिकाणावर जाऊनच मिळाले.
आम्ही सर्वजण सकाळीच आपापल्या गाड्यांनी प्रवासाला निघालो. प्रवासात मुलांची धिंगा मस्ती, गमती जमती, गप्पा सुरू होत्या. मधला रस्ता हा वळणाचा असल्याने जातानी वेळ लागतो. पोचता पोचता संध्याकाळ झाली. प्रवासामुळे थोड थकलो. जसं जसे समोर नारळाची- सुपारीच्या बागा, लाल मातीची छोटीशी चिऱ्यांची कौलारू घरे, अरुंद असे छोटे छोटे रस्ते रस्ते, समुद्राच्या लाटांचा आवाज, थंड हवेची झुळूक हे सगळ बघून मनाचा व शरीराचा थकवा दूर झाला.
संध्याकाळचा सोनेरी पांघरून घेऊन मावळतीला जाणारा सूर्य पाहून, सांजेला रंगीबेरंगी होणारा समुद्रकिनारा, त्या फेसाळणाऱ्या लाटांमधून पायाखालची अलगद घसरत जाणारी वाळू त्यावरून चालण्याची मज्जा काही औरच होती. सर्वत्र काळोखात समुद्राचा खळखळणारा लाटांचा फक्त आवाज येत होता.
दूरवर समुद्रात बारीक तिमतिमणारे मालवाहू जहाजांचे दिवे हेलकावे खात होते. शेजारीच असणाऱ्या लाईट हाऊस काळोखात उजळून दिसत होता. रात्रीचे जेवण उरकून आम्ही लवकरच झोपी गेलो. सकाळीच उठून सर्वजण बीचवर जाण्यास तयार होते. हे अफलातून निसर्ग सौंदर्याचे अविष्कार बघताना डोळ्याचे पारणे फिटले. रात्री काहीच दिसत नव्हते. स्वच्छ पाणी असलेला दूरवर पसरलेला समुद्रकिनारा हा गर्दीपासून दूर आहे. विशेष म्हणजे हा समुद्र धोकादायक नाही. समान पृष्ठभाग असल्यामुळे समुद्रात मुलं लांबपर्यंत पाण्यात निवांत खेळू शकत होती.
कोणी किनाऱ्यावर फेरफटका मारत होते. कोणी या निसर्गाला कॅमेरामध्ये कैद करत होते. आम्ही सुद्धा पाण्यात समुद्राच्या लाटांसोबत खेळताना आपल बालपण अनुभवत होतो. फ्रेश झाल्यावर आम्ही कोकणी जेवणाचा सोलकढी, कोळंबी, सुरमई मस्त आस्वाद घेतला. अंजीरले येथील कड्यावरील गणपती मंदिर हे प्राचीन स्थापत्य कलेचा उत्कृष्ट नमुना आहे. इथला उजव्या सोंडेचा गणपती हे पर्यटकांचे श्रद्धास्थान. एका अखंड खडकामध्ये ही मूर्ती कोरलेली आहे. कड्यावरील नारळाच्या झाडांनी मंदिर अच्छादलेले आहे.
कड्यावरून जाताना टेकडीवरून डोळ्यात न सामावणाऱ्या निळ्याशार अथांग समुद्राचे दर्शन होते. हे पाहताना आपण आपले देहभान विसरून जातो. येथील ऑलिव्हरीडले बीच आवर्जून बघण्यासारखा आहे. इथे यकासव महोत्सव म्हणजे कासवांचा अंडी घालण्यापासून जन्मानंतर त्यांचा समुद्रापर्यंत जाण्याचा प्रवास येथे अनुभवता येतो. इवली इवलीशी कासवे लाटांच्या पहिल्या स्पर्शाने कशी कावरीबावरी होतात, गडबडून जातात हे बघताना मज्जा येते. दुसऱ्या बाजूला असणारी कारले खिंड हे ठिकाण म्हणजे निसर्ग प्रेमींसाठी पर्वणीच आहे. घनदाट हिरवळीमध्ये असणाऱ्या पठारांवर, खडकातून वाट काढत लांबवरचा सह्याद्रीचा सुखावह नजारा पाहण म्हणजे स्वर्गसुखच.
अंजीरले पासून सात ते आठ किलोमीटर लांब हरणे बीच आहे. तिथे संध्याकाळी ताज्या माशांचा लिलाव होतो. येथील मासे घेऊन चविष्ट, घरगुती, ताजे मसाले वापरून केलेल्या वेगवेगळ्या पदार्थांवर आम्ही मनसोक्त ताव मारला. नंतर सुवर्णदुर्ग किल्ला पाहण्यासाठी गेलो. किल्ल्यावर जाण्यासाठी जेटटी ने १५ ते २० मिनिटे लागतात. किल्ल्याचे आतील अवशेष पडलेले आहेत. पण तटबंदी अजूनही चांगल्या स्थितीत आहे.
वापस येतानी समुद्रात आम्हाला डॉल्फिनचे दर्शन झाले. हा आमच्यासाठी अलभ्य लाभ होता. मुले खूप खुश झाले. नंतर आम्हाला कळाले की, येथे डॉल्फिन सफारीची सुद्धा सुविधा आहे. चार-पाच दिवस हसत खेळत, फिरण्यात कसे गेले ते कळाले नाही. परतीचा दिवस उजाडला तेव्हा मुलांची बिलकुल निघण्याची इच्छा नव्हती. त्यांना अजून एखादा दिवस थांबायच होतं. मग पुढच्या सुट्ट्यात इथेच जास्त दिवसांसाठी सहलीला येऊ असे आश्वासन देऊन सुंदर आठवणी मनात साठवून आम्ही परतीच्या प्रवासाला निघालो. खरच अंजीरलेचा किनारा म्हणजे खऱ्या अर्थाने रत्नच आहे.
काश्मीरमधील डल सरोवराची निर्मिती कशी झाली, सुंदर असूनही ‘डल’असं नाव का पडलं?
Kashmir Tourism :
आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी योग दिवस काश्मीरमध्ये साजरा केला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी निसर्गाच्या सानिध्यात योग करण्यासाठी काश्मीरमधील डल सरोवराची निवड केली होती. पण काही कारणाने त्यांना योगा एका हॉलमध्ये करावा लागला. पण मोदींच्या योगाच्या कार्यक्रमामुळे डल सरोवर मात्र चर्चेत आलं.
हे डल सरोवर अतिशय सुंदर असून त्याचे फोटो पाहूनच आपण त्याच्या प्रेमात पडतो. मात्र, त्याला हे नाव कसे पडले. आणि त्याची निर्मिती कशी झाली याबद्दल माहिती घेऊयात.

Kashmir Tourism
या सरोवराची निर्मिती कशी झाली
या प्रश्नाचे उत्तर म्हणून अनेक सिद्धांत मांडले जातात. एक सिद्धांत सांगतो की ही एक हिमनदी आहे जी कालांतराने सरोवरात बदलली आहे. झेलम नदीला आलेल्या भयंकर पुरामुळे डल सरोवराची निर्मिती झाली असावी असा दुसरा सिद्धांत सांगतो. मात्र, या प्रश्नाचे कोणतेही ठोस उत्तर अद्याप मिळालेले नाही.
डल सरोवर सुमारे 18 चौरस किलोमीटर क्षेत्रफळात आहे? त्याची रुंदी सुमारे 3.5 किलोमीटर आणि कमाल खोली 20 फूट आहे. डल सरोवरात बोड दल, नागीन, गगरीबल आणि लोकुत दल अशी चार खोरे आहेत. मुघल काळात बांधलेली सुंदर उद्याने या तलावाचे सौंदर्य वाढवतात.

Kashmir Tourism
डल असे नाव का आहे?
डल तलाव हा शब्द प्रादेशिक भाषा आणि संस्कृती दर्शवतो. काश्मिरी भाषेत ‘डल’ या शब्दाचा अर्थ तलाव असा होतो. पुढे ‘डल’ सोबत ‘तलाव’ हा स्वतंत्र शब्द सामान्य बोलण्याच्या प्रवाहात जोडला गेला, नंतर त्याला ‘डल तलाव’ असे म्हणण्यास सुरूवात झाली.
डल सरोवराला काश्मीरच्या मुकुटातील रत्न किंवा श्रीनगरचे रत्न असेही म्हणतात. जुलै-ऑगस्ट महिन्यात येथील उद्यानांचे सौंदर्य पाहण्यासारखे असते.

Kashmir Tourism
डल सरोवर कशासाठी प्रसिद्ध आहे?
मत्स्यपालन आणि जलसंचयनाचा हा एक महत्त्वाचा स्रोत आहे. पर्यटनाव्यतिरिक्त मासेमारी हा येथील दुसरा मोठा व्यवसाय आहे. यामुळे स्थानिक लोकांचा उदरनिर्वाह चालतो.
जर तुम्ही डल सरोवराला भेट दिली, तर नक्कीच हाऊसबोटीवर बसून शिकारा करण्याचा आनंद घ्या. पर्यटनाच्या दृष्टिकोनातून डल सरोवरातील इतर महत्त्वाची ठिकाणे म्हणजे शालिमार बाग आणि निशात बाग होय. येथे गोड पाण्याचा धबधबा आणि उद्यान ही येथील प्रेक्षणीय स्थळे आहेत.
स्वर्गातील अद्भुत इंद्राचा दरबार अनुभवायचाय? मग, खेड-साताऱ्याला जोडणाऱ्या 'या' घाटाला जरुर भेट द्या
पावसाळ्यात सुरुवातीपासून तुम्हाला कोकणी खेडेगावातून दोन्ही बाजूला हिरवी भाताची रोपे आणि मध्ये काळाकुळकुळीत डांबरीरोड असा प्रवास सुरू होतो.
-पराग वडके, रत्नागिरी
parag.vadake@gmail.com
लाल खेकडे, ढगांचे एकमेकांवर आपटणे, ढगांचे फुटणे, पाऊस कसा कोसळतो, क्षणात ढग आणि क्षणात स्वच्छ भव्य निसर्गाचा चमत्कार, असंख्य औषधी वनस्पती, हवे तसे सुरक्षित धबधबे हे सर्व पावसाच्या स्वागतासाठी पाहायचे असेल तर थेट गाठायचा तो खेड-सातारा (Khed-Satara) यांना जोडणारा रघुवीर घाट पाहायला.
रघुवीर घाट (Raghuveer Ghat) हा रत्नागिरी आणि सातारा दोन जिल्हे जोडतो. एकूण १२ किलोमीटरचा घाट आहे. समुद्रसपाटीपासून उंची ७६० मीटर म्हणजे जवळजवळ १४४० फूट उंच. चिपळूणकडूनसुद्धा चोरवणे, खोपी, शिरगाव ही गावे करत तेथे जाता येते. मुळात हा मार्ग वनखात्याच्या अंतर्गत येतो. व्याघ्र प्रकल्पसुद्धा (Tiger Project) याच मार्गावर येतो. सातारा व रत्नागिरी जिल्ह्यांना जोडणारा एखादा आणखी मार्ग असावा असा प्रस्ताव १९९० ला मांडला गेला; पण वनखात्याच्या आणि निसर्गसंपदेच्या रक्षणासाठी रडतखडत परवानग्या मिळत हा घाट पूर्ण झाला; पण आजही एकेरी मार्ग आहे.
हा १२ किलोमीटरचा प्रवास एक सुखद अनुभव आहे. विशेषतः पावसळ्यात सुरुवातीपासून तुम्हाला कोकणी खेडेगावातून दोन्ही बाजूला हिरवी भाताची रोपे आणि मध्ये काळाकुळकुळीत डांबरीरोड असा प्रवास सुरू होतो. वाटेत आत्ताच्या काळात लाल माती आणि नांगरणी तर कुठे लावणी तर कुठे चढणीचे मासे पकडणारे स्थानिक आणि फुल टू फोटोग्राफीची धमाल करत आपण जात असतो.
जर तुम्ही खेडमार्गे येणार असाल तर वाटेत खेड ते रघुवीर घाट या मार्गावर वेरूळ, हेदली, सवेणी, ऐनवरे, बिजघर इत्यादी गावे लागतात. प्रत्येक गाव स्थानिक विविध वैशिष्ट्यांनी भरलेले आहे. बिजघर येथे ३७५ वर्षापूर्वीचे प्राचीन शिवपार्वती काळकाई मनाई मंदिर आणि परिसर पाहण्यासारखा आहे. अशी ठिकाणे करत करत आपण घाटरांगेत वर वर जाऊ लागतो. त्या वेळी निसर्गाचा एक नैसर्गिक चमत्कार दिसतो. भारतात फक्त काही ठिकाणी दिसणारे विशिष्ट जातीचे लाल खेकडे काळ्याभोर दगडावर दिसू लागतात. ते नेमके या सीझनला कसे काय येतात कळत नाही आणि तुम्ही अगदी घाटमाथ्यावर पोहचता.
तिथे गेल्यावर सरकारने मनात आणले तर एखादे पर्यटनस्थळ कसे विकसित होऊ शकते त्याचे उदाहरण पाहायला मिळते. डोंगररांगामध्ये एक लांबलचक डोंगराची माची आहे. त्याच्या थेट आतपर्यंत शासनाने मस्त रेलींगमध्ये बसायला पेव्हरब्लॉकचा फूटपाथ बांधला आहे. त्यामुळे आपल्याला थेट दरीत जाण्याचा अनुभव घेता येतो. हाच रस्ता पुढे शिंदी गावात आणि थेट तापोळा, महाबळेश्वर वगैरेला जातो. तुमच्याकडे अजून थोडा वेळ असेल तर तुम्ही पुढे जाऊ शकता. शिंदी गावातील खिंडसुद्धा अशीच पाहण्यासारखी आहे. असंख्य फोटोस्पॉट आहेत. कोकण पावसात स्वर्ग बनतो असे म्हणतात तर रघुवीर घाट त्या स्वर्गातील अद्भुत इंद्राचा दरबार आहे. त्यामुळे फिरस्ती करणाऱ्यांनी जरूर भेट द्यावा, असाच हा घाट आहे.
(लेखक दऱ्याखोऱ्यांतून भटकंती करणारा सामाजिक कार्यकर्ता आहे.)
राजापुरातील 'हे' चारही धबधबे झाले प्रवाहित; हिरव्यागार शालू पांघरलेल्या डोंगरकपारीतून कोसळणाऱ्या धबधब्यांकडे वळू लागले पर्यटक
या धबधब्याखाली आनंद लुटण्यासाठी वर्षा सहलींच्या माध्यमातून अनेकांचे पाय आता धबधब्यांकडे वळू लागले आहेत.
राजापूर : कोकणाला निसर्गदत्त (Konkan Tourism) लाभलेल्या सौंदर्याने अनेकांना भूरळ घातली आहे. उंचावरून पडणाऱ्या धबधब्यांच्या स्वरूपामध्ये ओघळणारे मोती पर्यटकांचे लक्ष वेधून घेत आहेत. निसर्ग सहवासाचा आनंद लुटण्यासाठी ‘वर्षा सहलींच्या’ माध्यमातून हौशी पर्यटकांचा मोर्चा हिरव्यागार शालू पांघरलेल्या डोंगरकपारीतून कोसळणाऱ्या धबधब्यांकडे आता वळू लागला आहे.
उन्हाळ्यामध्ये पाण्याअभावी मृतावस्थेमध्ये असलेले तालुक्यातील धोपेश्वर येथील मृडानी नदीवरील धबधबा (Waterfall), चुनाकोळवण येथील सवतकडा आणि परीटकडा धबधबा, ओझर येथील धबधबा, हर्डी येथील कातळकडा धबधबा (Katalkada Waterfall) गेल्या काही दिवसांपासून प्रवाहित झाले आहेत. या धबधब्याखाली आनंद लुटण्यासाठी वर्षा सहलींच्या माध्यमातून अनेकांचे पाय आता धबधब्यांकडे वळू लागले आहेत.
पावसाळ्यामध्ये अविस्मरणीय आनंद मिळवून देणाऱ्या धबधब्यांकडे थेट जाण्यासाठी असलेल्या पायवाटा अरूंद आणि बिकट आहेत. रस्त्यांचीही फारशी चांगली स्थिती नाही. असे असले तरी, या ठिकाणी येणाऱ्या पर्यटकांची संख्या कमी होताना दिसत नाही. गेल्या काही वर्षांमध्ये चुनाकोळवण येथील सवतकडा आणि परीटकडा राज्याच्या कानाकोपऱ्यातील पर्यटकांच्या गळ्यातील ताईत बनला आहे. दरवर्षी या ठिकाणी पर्यटनाचा आनंद लुटण्यासाठी येणाऱ्या पर्यटकांची संख्याही वाढतच चालली आहे.
धोपेश्वर धबधबा : शहरापासून सुमारे तीन किमी.
चुनाकोळवणचा सवतकडा : राजापूर-ओणी- कळसवलीमार्गे २१-२२ किमी.
हर्डी येथील कातळकडा : शहरापासून सुमारे २ किमी.
ओझरचा धबधबा : राजापूर- सौंदळ या रस्त्यापासून दोन किमी.
गोवा म्हणजे नुसतं बीच नव्हे, पावसाळ्यात गोव्यात येईल खरी मजा, ही ठिकाणी नक्की पहा!
Monsoon Tourism :
गोव्याला लोक बीच पहायला जातात. सागराच्या लाटांवर स्वार होऊन ते आपले दु:ख, टेन्शन विसरून जातात. काही लोक गोव्याला एन्जॉय करायला जातात. तर काही लोक गोवा अनुभवायला जातात. पण, ज्याने गोवा पाहिला नाही त्यांना केवळ बीचेस आणि पार्टी इतकेच दिसते. पण, गोवा तेवढ्यापुरता मर्यादीत नाही.
गोव्यात असे अनेक स्पॉट आहेत. जिथे तुम्ही पावसाळ्यातही भेट देऊ शकता. गोव्याला निसर्ग सौंदर्याचा वारसा लाभला आहे. समुद्र किनाऱ्यांहून सुंदर इथली वास्तुकला, इथली जंगले, मसाल्यांच्या बागा आहेत. गोव्यात पाऊस जास्त असल्याने तिकडचे समुद्र किनाऱ्यांकडे फारसे जाऊ देत नाहीत. त्यामुळे, पावसाळ्यात जर गोव्याला जायचा प्लॅन करत असाल तर ही दुसरी ठिकाणे एक्सप्लोअर करू शकता.
अर्वालेम गुहा
महाभारत काळातील गुहा गोव्यात आहेत. पांडवही द्रौपदीसोबत गोव्यात आले होते. ही लेणी उत्तर गोव्यातील संकलीम गावात आहेत. पांडव त्यांच्या वनवासाच्या काळात या लेण्यांमध्ये राहत होते. या लेण्यांमध्ये पांडवांचे अस्तित्व सिद्ध करणारा कोणताही ठोस पुरावा नसला तरी स्थानिक लोकांचा असा विश्वास आहे. या गुहा 7व्या शतकात बांधल्या गेल्याचे इतिहासकारांचे म्हणणे आहे:
.jpg?w=640&auto=format%2Ccompress)
कातळ शिल्प
ज्यांना ऐतिहासिक गोष्टी आवडतात ते गुजरात,राजस्थानला भेटी देतात. पण, तुमच्या माहितीसाठी सांगतो की, गोव्यातही ऐतिहासिक खजाना दडलेला आहे. गोव्यातील अनेक पठारांवर कातळशिल्प पहायला मिळतात. गोव्यातील रिवोना येथील कुशावती नदीच्या काठी वसलेले उसगलीमल हे असेच एक ठिकाण आहे.
.jpg?w=640&auto=format%2Ccompress)
अंथन डॅम
गर्दीपासून दूर एखाद्या शांत ठिकाणी जायचे असेल तर तुम्ही अंथन डॅमवर जाऊ शकता. हे ठिकाण नैसर्गिकरित्या अतिशय सुंदर आणि शांत आहे पण येथे फार कमी पर्यटक येतात. पक्षीनिरीक्षक आणि छायाचित्रण प्रेमींसाठी हे ठिकाण नंदनवन मानले जाते.
दूधसागर धबधबा
गोव्याला भेट देऊन दूधसागर धबधबा पाहिला नाही तर गोव्याला भेट देणे अपूर्ण मानले जाते. दूधसागर धबधबा हा गोव्यातील सर्वात मोठ्या धबधब्यांपैकी एक आहे. हा धबधबा पाहण्यासाठी पर्यटक मोठ्या संख्येने येतात.
दूधसागर धबधबा वर्षभर वाहत असतो. गोवा-कर्नाटक सीमेवर स्थित, दूधसागर धबधबा 130 मीटर उंचीवरून पडतो. मांडवी नदीने तयार झालेल्या दूधसागर धबधब्याचे पाणी दुधासारखे पांढरे दिसते. पर्वत आणि हिरवाईने वेढलेला हा धबधबा खरोखरच सौंदर्याचा अप्रतिम नमुना आहे.

चांदोली उद्यानात आढळली आक्रमक होणारी सर्वभक्षक 8 अस्वले; काय आहेत या अस्वलांची वैशिष्ट्ये?
फळे, फुले, कीटक, मध आणि कधीकधी कुजके मांस हे भारतीय अस्वलाचे खाद्य आहे. त्यांना मध आवडतो.
शिराळा : चांदोली राष्ट्रीय उद्यानात (Chandoli National Park) बुद्ध पौर्णिमेला (२३ मे) पाणवठ्यावर झालेल्या गणनेत निसर्गप्रेमींना आठ अस्वले आढळून आली आहेत. ‘अस्वलाच्या गुदगुल्या’ हा शब्दप्रयोग सर्रास वापरला जात असल्याने या प्राण्याबद्दल सर्वांना आकर्षण आहे.
अस्वलाची (Bear) डोक्यापासून शरीराची लांबी १.४- १.८ मीटर; शेपूट १०-१२ सेंटिमीटर; खांद्यापाशी उंची ६०-९० सेंटिमीटर, वजन सामान्यत: ९०-११५ किलोग्रॅम असते. मादीपेक्षा नर आकाराने मोठा असतो. मुस्कट लांब, मोठे डोके आणि खुंटीसारखी शेपटी असते. मागचे पाय आखूड, जाड असतात; तर पाऊल मोठे व पाच बोटांचे असते. प्रत्येक बोटांवर नख्या असून त्या पुढच्या पावलांवर लांब असतात. अन्नाचे चर्वण करण्यासाठी अस्वलाचा जबडा पसरट व दात सपाट असतात. त्याशिवाय चार लांब सुळे असतात.
धोका जाणवल्यावर किंवा वास घेण्यासाठी ते मागील दोन पायांवर उभे राहतात. त्यांची दृष्टी कमकुवत असते. त्यामुळे वास घेऊन त्यांना आपला मार्ग शोधून काढावा लागतो. त्यांचे नाक खूप तीक्ष्ण असते आणि ते खाद्य शोधण्यासाठी या नाकावरच अवलंबून असतात. अस्वल हा सर्वभक्षक प्राणी आहे. हिवाळ्यापूर्वी तो अतिरिक्त चरबी साठवून ठेवतो, तर हिवाळ्यात झोपेत असतात. वनातील कोणतीही निवाऱ्याची जागा त्यांना राहायला आवडते. ते निशाचर आहे. भक्ष्य मिळविण्यासाठी ते सायंकाळी बाहेर पडतात. पहाटे निवासस्थानी परतात.
फळे, फुले, कीटक, मध आणि कधीकधी कुजके मांस हे भारतीय अस्वलाचे खाद्य आहे. त्यांना मध आवडतो. झाडावर चढून मधाने भरलेले पोळे ते खाली पाडतात आणि मध खातात. वाळवीची वारुळे फोडून त्यातील वाळवी ते खातात. ते झोपेत मोठ्याने घोरतात. त्यांच्या समागमाचा काळ हा उन्हाळा असतो. सात ते नऊ महिन्यांच्या गर्भावधीनंतर डिसेंबर-जानेवारीत मादीला १ किंवा २ पिल्ली होतात.
ती दोन-तीन महिन्यांची झाल्यावर आईच्या पाठीवर बसून बाहेर जाऊ लागतात. तीन वर्षांपर्यंत ती आईसमवेतच असतात. आईच या पिल्लांचे संरक्षण करते. या जातीत नर-मादी एकनिष्ठ आढळतात. त्यांचे आयुष्य २५ ते ४० वर्षांचे असते. सर्व अस्वले चटकन आक्रमक होतात आणि धोकादायक असतात. पंजाच्या एका फटक्यानिशी ते एखाद्या व्यक्तीला ठार करू शकतात.
अस्वलांची वैशिष्ट्ये
लांब, दाट फर : अस्वलाला थंड हवामानापासून वाचवण्यास मदत करणारे लांब, दाट फर असते. फरचा रंग प्रजातींमध्ये बदलू शकतो, परंतु काळा, तपकिरी, लालसर तपकिरी आणि पांढरा यांसह सर्वांत सामान्य रंगांमध्ये समाविष्ट आहे.
मजबूत पंजे : अस्वलाचे मजबूत पंजे त्यांना चढण्यास, खणण्यास आणि त्यांची शिकार पकडण्यास अनुमती देतात. त्यांच्या पायांवर लांब, वक्र पंजे देखील असतात, जे त्यांना बर्फ आणि बर्फावरून चालण्यास मदत करतात.
लांब, टोकदार नाक : अस्वलांचे लांब, टोकदार नाक त्यांना अन्न शोधण्यास मदत करते, जमिनीखाली लपलेले कीटक आणि मुळे देखील. त्यांची चांगली गंधाची भावना देखील असते, जी त्यांना अंधारात किंवा बर्फाखाली देखील अन्न शोधण्यास अनुमती देते.
सर्वभक्षी : अस्वल सर्वभक्षी आहेत आणि ते विविध प्रकारचे अन्न खातात, ज्यात फळे, भाज्या, कीटक आणि लहान प्राणी यांचा समावेश होतो. ते उत्कृष्ट शिकारी देखील आहेत आणि ते मासे, हरिण आणि अन्य मोठे प्राणी पकडू शकतात.
पावसाळ्यात भटकंतीला जाताय? मग, 'ही' खबरदारी नक्की घ्या.!
Monsoon Travel : मॉन्सूनच्या आगमनानंतर सध्या सह्याद्रीच्या दऱ्या-खोऱ्यामध्ये भटंकतीचे प्रमाण वाढले आहे. निसर्गप्रेमी जिल्ह्याच्या विविध गड-किल्ल्यावर आनंद घेण्यासाठी दाखल होत आहेत. मात्र, हे निसर्ग सौंदर्य पाहताना कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी विशेष काळजी घ्यावी, असे आवाहन अखिल महाराष्ट्र गिर्यारोहण महासंघाच्यावतीने करण्यात आले.
पावसाळा आला की, मोठ्या संख्येने निसर्गप्रेमी दैनंदिन कामाच्या ताणातून ‘रिफ्रेश’ होण्यासाठी सुट्यांमध्ये हजारो नागरिक ट्रेकिंग किंवा भटकंतीसाठी डोंगर, घाटमाथ्यावर किंवा गड-किल्ल्यावर पोहचतात. मात्र, भटकंतीच्या अतिउत्साहामुळे व अतिधाडसामुळे दरवर्षी अनेकांचा जीवदेखील जातो. ही बाब लक्षात घेऊन भटकंतीला जाताना नागरिकांनी विशेष खबरदारी घ्यावी.
रिल्स अन् व्हिडिओमुळे गर्दी...
समाज माध्यमावर रिल्स, शॉर्ट व्हिडिओमुळे भटकंतीचा ट्रेंड वाढला आहे. समाज माध्यमावर रिल्स, शॉर्ट अपलोड करण्यासाठी हा सर्व खटाटोप केला जातो. मात्र दरड, अपघात किंवा पाण्यात बुडाल्यावर अशा लोकांना वेळेत मदत मिळत नाही आणि त्यांचा मृत्यू होतो. पावसाळ्यात याचे प्रमाण जास्त असते. त्यामुळे हे प्रकार टाळण्यासाठी काही सूचना गिरीप्रेमी संस्थेतर्फे नागरिकांना देण्यात आल्या आहेत.
सुरक्षित ट्रेकिंगसाठी पर्याय...
चंदनवंदन किल्ला
वैराटगड
संतोशगड
वारुगड
चावंड
धोक्याची ठिकाणे...
कुंडलिका व्हॅली
अलंग मदन कुलंग किल्ला
कलावंतीण दुर्ग
हरिश्र्चंद्र गड
हरिहर किल्ला
पावसाळ्यात सह्याद्रीतील भटकंती जरूर केली पाहिजे. कारण या ऋतूमध्ये सह्याद्रीच रूप हे अत्यंत मनमोहक असते. परंतु, पावसाळी भटकंती अत्यंत काळजीपूर्वक केली पाहिजे. कारण सह्याद्रीतील निसरड्या वाटा, ढासळणाऱ्या दरडी, धुके, धबधबे, ओढ्यांचे तीव्र प्रवाह टाळले पाहिजेत. मानवी जीवन खूप अमूल्य आहे. या ऋतूमध्ये मानवी चुकांमुळे मृत्यू होतो. अतिसाहस किंवा अतिरेक न करता सुरक्षित ठिकाणी योग्य ती काळजी घेऊन भटकंती केल्यास त्याचा जास्त आनंद घेता येईल.
- उमेश झिरपे, अध्यक्ष, अखिल महाराष्ट्र गिर्यारोहण महासंघ
काय काळजी घ्याल?
ओळखीच्या व अनुभवी
ग्रुपसोबत ट्रेकला जावे
ट्रेकमधील भटक्यांची संख्या मर्यादित व नियोजन करता येईल, एवढीच असावी
ग्रुपकडे प्रथमोपचाराचे साहित्य असावे
ट्रेक कुठे, किती दिवसांचा आहे व लीडर, ग्रुप यांची माहिती जवळच्या व्यक्तीस द्यावी
सोबत चांगली टॉर्च ठेवावी
पावसाचा अंदाज पाहून ट्रेकचे नियोजन करावे
धुक्यात वावरताना सावधानता बाळगावी
सोबत जास्तीचे कोरडे पदार्थ ठेवावे
हे करणे टाळा...
किल्ल्यावरील तट, दरवाजे, इतर पडीक
अवशेष यांवर चढू नये
अवघड ठिकाणी फोटो किंवा सेल्फी घेणे टाळावे
पाण्याच्या प्रवाहात, ओढ्यात, नदीत उतरू नये
शक्यतो एकट्याने भटकंती किंवा
ट्रेकिंगचे नियोजन टाळावे
दुर्दैवाने काही दुर्घटना घडल्यास ७६२० २३० २३१ या २४x७ हेल्पलाइन नंबरवर आपत्कालीन मदतीसाठी संपर्क साधावा
खोरनिनको धबधबा, मुचकुंद ऋषींच्या गुहेची पर्यटकांना भुरळ; एकखांबी, बल्लाळ गणेश पाहण्यासाठी गर्दी
माचाळ येथे जातानाच प्रथम मुचकुंद ऋषी यांची गुहा आहे. या मुचकुंद ऋषी गुहेबद्दल एक पौराणिक आख्यायिका आहे.
लांजा : निर्सगाने नटलेला प्रदेश आणि थंड हवेचे ठिकाण असल्याने लांजा तालुका मिनी महाबळेश्वर (Mini Mahabaleshwar) म्हणून नावारूपाला येत आहे. तालुक्यातील खोरनिनको येथील मानवनिर्मित धरण, जावडे येथील एकखांबी गणपती मंदिर आणि मुचकुंद ऋषी यांची गुहा पर्यटकांना भुरळ घालत असून पावसाळ्यातील पर्यटनाला चालना मिळते.
माचाळ हे गाव निर्सगाच्या सान्निध्यात सह्याद्रीच्या उंच पर्वतरांगांवर वसलेले आहे. लांजा मुंबई-गोवा महामार्गावरून (Mumbai-Goa Highway) कोर्लेमार्ग कोचरी किंवा तळवडे मार्ग दाभोळे-शिपोशी कोचरी मार्ग माचाळ येथे जाण्यासाठी रस्ता आहे. महाराष्ट्र् पर्यटन विकास महामंडळाने या स्थळाचा ''ब'' वर्ग पर्यटनस्थळात समावेश केला आहे. माचाळच्या समोरच इतिहासातील प्रसिद्ध विशाळगड मोठ्या दिमाखात उभा आहे. या मिनी महाबळेश्वरला भेट देण्याचा मोह पर्यटकांना आवरत नाही.
माचाळ येथे जातानाच प्रथम मुचकुंद ऋषी यांची गुहा आहे. या मुचकुंद ऋषी गुहेबद्दल एक पौराणिक आख्यायिका आहे. त्या ठिकाणी माचाळच्या ग्रामस्थ मंडळींनी सुंदर मंदिरही बांधलेले आहे. त्याचबरोबर या परिसरात खोरनिनको धरण आणि त्यावरचा मानवनिर्मित धबधबा हे पर्यटकांसाठी मोठे आकर्षण असते. तेथील निसर्गसौंदर्य आणि शांतता पर्यटकांना खिळवून टाकते. येथील कौशल्याने बांधलेल्या पायऱ्यांवरून वाहणारे पाणी नजरबंदी करते. हे धरण चारीबाजूंनी डोंगरांनी वेढलेले आहे आणि पावसाळ्यात येथील दृश्य विलोभनीय आहे.
या धरणाला दरवाजे नाहीत. जेव्हा धरण पूर्ण भरते तेव्हा त्यातील पाणी वैशिष्ट्यपूर्ण पायऱ्यांसारख्या रचनेमुळे शांतपणे खाली वाहात येते, असा हा खोरनिनको धबधबा आहे. या धबधब्यात पर्यटक आंघोळ करण्यासाठी पावसाळ्यात हजेरी लावतात. जवळच जावडे येथे शिंदे कुटुंबीयांनी घरासमोर एक खांबावर टुमदार असे गणपतीचे मंदिर साकारले आहे. एका खांबावर बांधण्यात आलेल्या हे मंदिर पाहण्यासाठी पर्यटक हजेरी लावतात तसेच प्रभानवल्ली येथील गणेशखोरी डोंगरपठारावर श्री बल्लाळ गणेशाचे मंदिर आहे. येथे भाविक मोठ्या संख्येने हजेरी लावतात. त्यामुळे पावसाळी पर्यटनासाठी पर्यटकांची गर्दी होते.
माचाळ हे गाव थंड हवेचे ठिकाण असून, हे गाव जगाच्या नकाशावर आणण्यासाठी सर्वांच्या सहकार्याने आपण प्रयत्न केले गेले. त्याचे फळ आता दिसू लागले आहे.
-विवेक सावंत, लांजा
UNESCO च्या पुरस्कारासाठी नामांकन मिळालेलं गुजरातमधील स्मृतिवन म्यूजियम तुम्ही पाहिले का?
Smritivan Museum :
UNESCO ने जगातील 7 प्रमुख संग्रहालयांमध्ये भारतातील एका संग्रहालयाची निवड केली आहे. जागतिक स्तरावर भारतीय संग्रहालयाला अशी मान्यता मिळण्याची ही पहिलीच वेळ आहे. गुजरातमध्ये असलेल्या स्मृतीवन संग्रहालयाला जागतिक स्तरावर ओळख मिळाली आहे.
Plix Versailles Museum 2024 साठी निवडलेले गुजरातचे 'Smritivan Museum' UNESCO ने जागतिक विभागात समाविष्ट केले आहे. UNESCO 2015 पासून वर्षातून एकदा Plix Versailles Museum 2024 स्पर्धा आयोजित करते.
या स्पर्धेच्या माध्यमातून युनेस्को जगभरात होत असलेल्या आधुनिक बांधकामांवर प्रकाश टाकते. गुजरातच्या स्मृतीवन संग्रहालयासोबत जगभरातील इतर 6 संग्रहालयांचाही समावेश आहे. युनेस्कोने या पुरस्कारासाठी इतर 7 संग्रहालयांसह शॉर्टलिस्ट केले आहे. गुजरात टुरिझमच्या अधिकृत एक्स हँडलवर ही माहिती देण्यात आली आहे.
26 जानेवारी 2001 रोजी गुजरातमधील भुज येथे झालेल्या भीषण भूकंपाची आठवण लोकांना रहावी यासाठी हे स्मारक उभारण्यात आले आहे. या भूकंपात एका क्षणात हजारो लोकांचा जीव गेला होता. त्यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी गुजरातच्या मुख्यमंत्रीपदावर होते. भूकंपात प्राण गमावलेल्या हजारो लोकांना श्रद्धांजली वाहण्यासाठी, गुजरातमध्ये 470 एकर क्षेत्रावर 'स्मृतीवन संग्रहालय' बांधले गेले.

या पुरस्कारासाठी शॉर्टलिस्ट झाल्यामुळे गुजरातचे स्मृतीवन संग्रहालय जगभर प्रसिद्ध झाले आहे. Plix Versailles Museum 2024 श्रेणीसाठी स्मृतीवन संग्रहालयाची निवड करण्यात आली आहे. 2024 च्या जागतिक स्पर्धेसाठी निवडलेल्या स्थांसंना प्राइज व्हर्साय, इंटिरियर आणि एक्सटेरियर या तीन श्रेणींच्या आधारे स्पर्धेत भाग घ्यावा लागेल.
या वर्षी नोव्हेंबरमध्ये युनेस्को मुख्यालयाकडून विजेत्यांची घोषणा केली जाईल. प्रिक्स व्हर्साय हे वास्तुकला आणि डिझाइनसाठी दिले जाणारे पारितोषिक आहे. हा पुरस्कार 2015 मध्ये सुरू करण्यात आला.

गुजरात टुरिझमच्या अधिकृत एक्स हँडलवर ही माहिती देण्यात आली आहे. या पुरस्कारासाठी शॉर्टलिस्ट झाल्यामुळे गुजरातचे स्मृतीवन संग्रहालय जगभर प्रसिद्ध झाले आहे. Plix Versailles Museum 2024 श्रेणीसाठी स्मृतीवन संग्रहालयाची निवड करण्यात आली आहे.

आशियातील सर्वात उंच धबधबा आहे ड्यूप्लिकेट? चीनी पर्यटकाने असा लावला शोध, व्हिडिओ होतोय तुफान व्हायरल
Viral Video: पावसाळा सुरू होताच अनेक लोकांना फिरण्याचे वेध लागतात. अनेक लोक धबधबे पाहण्यासाठी विविध ठिकाणांना भेट देतात. धबधबा बघताना वेगळीच मज्जा येते. काही ठिकाणी उंच शिखरांवरून पाणी येते तर काही ठिकाणी जंगलांच्या मधोमध शिखरावरून ओढा वाहत असतो… हे खूप आनंददायी अनुभूती असते. पण सध्या सोसघल मिडियावर एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये चीनचा एक बनावट धबधबा समोर आला आहे. जो दिसायला खूपच सुंदर आहे. पण धबधब्याचे सौंदर्य वाढवण्यासाठी पाईपद्वारे पाणीपुरवठा केला जातो.
एका चीनी व्लॉगरने धबधब्याबद्दल एक धक्कादायक माहिती समोर आणली आहे. जगातील काही गोष्टी नैसर्गिक नसतात पण दिसायला सुंदर असतात. आता चीनचा युंटाई वॉटरफॉल याचे जिवंत उदाहरण आहे. जो आशियातील सर्वात उंच धबधबा आहे. ज्याची उंची 314 मीटर आहे. एवढ्या उंचीवरून पाणी पडल्यावर इथे येणाऱ्या लोकांना दाद द्यावी लागते. यामुळेच दरवर्षी जगभरातून शेकडो पर्यटक या ठिकाणी येतात.
व्हायरल होत असलेल्या ब्लॉगरच्या व्हिडिओमध्ये त्याने युनताई धबधब्याबद्दल सत्य सांगितले आहे. हा धबधबा दिसायला खूप सुंदर आहे परंतु हा धबधबा मानवाने बनवला आहे. चायनीज व्लॉगर कसा तरी धबधब्याच्या शिखरावर पोहोचला आणि त्याने तिथे जे काही दिसले त्याचा व्हिडिओ बनवला. जो सोशल मिडियावर तुफान व्हायरल होत आहे. मोठ्या पाईप्समधून धबधब्यात पाणी येत आहे.
पण जेव्हा हा व्हिडिओ सोशल मिडियावर आला तेव्हा लोकांनी याला खोटे म्हटले कारण इतका सुंदर धबधबा माणसाने बनवला आहे हे खरे वाटत नव्हते. पण नंतर युताई माउंटन सीनिक एरियाने स्वतः सांगितले की धबधब्याचे सौंदर्य वाढवण्यासाठी पाईपद्वारे पाणीपुरवठा केला जातो. याशिवाय याठिकाणी पाण्याचे पंप आणि पाईप्स बसवण्यात आल्याने खऱ्या धबधब्याची अनुभूती येते, असेही सांगण्यात आले. या धबधब्याचे सत्य जाणून घेतल्यानंतर येथील लोकांना आश्चर्याचा धक्का बसला आहे.
कोकणात घ्या केरळाचा फिल, वॉटर स्पोर्ट्सच्या रांगेत आता हाऊसबोट दाखल
House Boat In Kokan :
सिंधुदूर्ग जिल्हा पर्यटनाच्या दृष्टीने विकसीत होत आहे. इथे स्कुबा डायव्हिंग, वॉटर बाईक असे अनेक वॉटर स्पोर्ट्स आहेत. त्यामुळे पर्यटकांची गर्दी कोकणात विशेषत: मालवण-तारकर्ली बिचकडे वाढत आहे. कोकणातील पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी स्थानिक नागरिकही अनेक युक्त्या लढवत आहेत.
कोकणातील समुद्र जसे अथांग आहेत तसेच इथल्या नद्यांचे पात्रही मोठे-विस्तीर्ण आहे.कोकणातील कर्ली नदीच्या पात्रात आणि दाभोळ खाडीत हाऊस बोट सुरू करण्यात आली आहे. पाण्यावर तरंगणारं अलिशान हॉटेल असेच या बोटीकडे पाहून म्हणता येईल.

समुद्रातून किंवा खाडीमध्ये कांदळवन आणि मगर सफर करणाऱ्या पर्यटकांना हाऊस बोटची सफर करता येणार आहे. कोकणातील गुहागर मध्ये परचुरी गावात एका तरुणाने हाऊस बोट तयार करण्याचे धाडस दाखवत गुहागर मधील पर्यटन वाढीसाठी एक नवे पाऊल टाकले आहे.
दोन मजली असणारी ही हाऊस बोट आकर्षक चित्रांनी रंगवण्यात आली आहे. डायनिंग प्लेस, बेडरूम आणि रूममध्येच फ्रीज,टिव्ही,वॉर्डरोब देखील उपलब्ध आहे. २४ तासांसाठी ही बोट तुम्हाला वापरता येते. जेवण-चहा नाश्ता सर्वकाही इथे पॅकेजमध्येच मिळते.
केरळमध्ये आहेत तशा हाऊस बोट महाराष्ट्रातील पर्यटकांना अनुभवता यावी यासाठी ही बोट तयार करावी असा विचार मनात आला, असे ही हाऊसबोट सत्यवान देरदेकर यांनी बनवली यांनी सांगितले.
कोकणात कर्ली नदीच्या किनारी आणि परचुरी गावाजवळ असलेल्या दाभोळच्या खाडीत ही हाऊस बोट आहे. या हाऊस बोटमधून नदीची सफर,मगरींचे दर्शन घडते.

कोकणातील सर्वच गोष्टी केरळची आठवण करून देतात. केरळ देवभूमी असली तरी त्याच तोडीचे निसर्ग सौंदर्य कोकणलाही लाभले आहे. त्यामुळे कर्नाटक,गोवा आणि महाराष्ट्रातील लोक कोकणात येतात. तिथले ग्रामिण जीवन, खाद्यसंस्कृती एन्जॉय करतात. आशातच आता या हाऊस बोटमुळे पर्यंटकांना आनंद द्विगुणीत होणार आहे.
रिव्हर राफ्टिंगचा प्लॅन करताय? मग, भारतातील ‘या’ सर्वोत्तम ठिकाणांना नक्की द्या भेट
Travel Diaries : सध्या देशातील अनेक भागांमध्ये प्रचंड उकाडा निर्माण झाला आहे. काही राज्यांमध्ये तर उष्णतेची लाट निर्माण झाली आहे. या उष्णतेच्या लाटेमुळे काही जणांचा बळी देखील गेला आहे. खर तर उन्हाळ्यात अनेकांना सुट्ट्या लागलेल्या असतात. त्यामुळे, या सुट्टीमध्ये बाहेर फिरायला जाण्याची सगळ्यांची इच्छा असते.
उष्णतेपासून आराम मिळवण्यासाठी आणि कुठेतरी थंड हवेच्या ठिकाणी जाण्यासाठी सगळेजण उत्सुक असतात. रिव्हार राफ्टिंग करायला अनेकांना आवडते आणि रिव्हर राफ्टिंगसाठी उन्हाळा हा सर्वोत्तम काळ मानला जातो. वॉटर स्पोर्ट्सपैकी एक असलेले हे रिव्हर राफ्टिंग हे करायला अतिशय आव्हानात्मक असते. ज्या लोकांना साहस करायला आवडते. त्यांनी आयुष्यात एकदा तरी रिव्हर राफ्टिंगचा आनंद जरूर घ्यावा.
यंदाची सुट्टीत जर तुम्ही रिव्हार राफ्टिंग करायचा विचार करत असाल तर त्यासाठी भारतातील टॉप ठिकाणे कोणती आहेत? ते आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. चला तर मग जाणून घेऊयात ही रिव्हर राफ्टिंगची सर्वोत्तम ठिकाणे
महाराष्ट्रातील कोलाड
कोलाड हे महाराष्ट्रातील एक लोकप्रिय पर्यटनस्थळ आहे. मुंबई आणि पुण्याजवळ स्थित असलेले हे एक प्रमुख पर्यटनस्थळ आहे. महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध असलेले हे ठिकाण पर्यटकांनी नेहमीच गजबजलेले असते. कुंडलिका नदीवर रिव्हर राफ्टिंगसाठी हे ठिकाण प्रसिद्ध आहे. येथील नैसर्गिक सौंदर्य आणि नदीचे नयनरम्य दृश्य रिव्हर राफ्टिंगची मजा आणखी द्विगुणित करते. महाराष्ट्रातील लोकांना जर रिव्हर राफ्टिंग करायचे असेल तर, त्यांनी या ठिकाणी जरूर जावे.
उत्तराखंडमधील ऋषिकेश
उत्तराखंड राज्यातील एक लोकप्रिय पर्यटनस्थळ म्हणून ऋषिकेशला ओळखले जाते. हे शहर गंगा नदीच्या काठावर वसले आहे. रिव्हर राफ्टिंगची राजधानी म्हणून ही ऋषिकेशला ओळखले जाते. दरवर्षी देश-विदेशातील असंख्य पर्यटक या ठिकाणी भेट देत असतात. रिव्हर राफ्टिंगसोबतच तुम्ही येथील आसपासच्या ठिकाणांना ही भेट देऊ शकतात.
हिमाचल प्रदेशातील कुलू-मनाली
कुलू-मनाली हे हिमाचल प्रदेशातील एक लोकप्रिय ठिकाण आहे. दरवर्षी देश-विदेशातील असंख्य पर्यटक या ठिकाणी भेट देण्यासाठी येतात. येथील उंच बर्फाच्छादित पर्वत, बर्फातील विविध खेळ आणि इतर प्रेक्षणीय ठिकाणांना तुम्ही भेट देऊ शकता. यासोबतच तुम्ही येथून वाहणाऱ्या बियास नदीवर रिव्हर राफ्टिंगचा आनंद घेऊ शकता.
कर्नाटकातील कुर्ग
कर्नाटक राज्यातील कुर्ग हे एक अतिशय सुंदर पर्यटनस्थळ आहे. कुर्ग हे शहर तिथल्या नैसर्गिक सौंदर्यासाठी आणि कॉफीच्या बागांसाठी खास करून ओळखले जाते. येथील बारीपोल नदीवर तुम्ही रिव्हर राफ्टिंगचा आनंद घेऊ शकता.
गुरूत्वाकर्षणाचा सिद्धांत इथे होतो फेल, भारतात या ठिकाणी वाहते उलट दिशेला पाणी
Manipat Tourism :
जगभरात अशी अनेक ठिकाणे अशी आहेत जी आपल्याला बुचकळ्यात पाडतात. जी ठिकाणं पाहुन आपण आश्चर्यचकीत होतो. असेच एक ठिकाण छत्तीसगडमध्ये आहे. इतर ठिकाणांप्रमाणेच छत्तीसगड हे ठिकाणही सध्या पर्यटनासाठी प्रसिद्ध होत आहे.
छत्तीगडमधील एका ठिकाणी पाणी उलट्या दिशेला वाहते. हे पाणी उलट का वाहते आणि त्यासाठी संशोधकांनी काही अंदाज व्यक्त केले आहेत. मेनपत हे छत्तीसगडच्या सुरगुजा जिल्ह्याच्या टेकड्यांमध्ये वसलेले आहे.
या ठिकाणाला छत्तीसगडमधील शिमला असेही म्हणतात. मेनपत हे एक हिल स्टेशन म्हणून खूप लोकप्रिय झाले आहे, त्यामागील कारण म्हणजे येथे वाहणारे उलटे पाणी.
मेनपत हे त्याच्या नैसर्गिक सौंदर्यासाठी ओळखले जाते. या मेनपाटच्या घनदाट जंगलात बिसरपाणी गाव वसले आहे. या गावाचे वैशिष्टय़ म्हणजे येथे वाहणारे पाणी विरुद्ध दिशेला वाहते म्हणजेच जेथे चढ आहे त्या दिशेला वाहते. या ठिकाणी असलेल्या आंब्याच्या झाडाजवळ हे पाणी भूगर्भातून उगम पावते. हे भूगर्भातील पाण्याचे उगमस्थान मानले जाते.

सुरुवातीला हे पाणी बाहेर आल्यावर त्याच दिशेने वाहत होते, परंतु 20-25 मीटर वाहून गेल्यावर ते 100 मीटरपर्यंत उतारावर चढताना दिसते. मात्र, हा चमत्कार नसून गावाच्या भौगोलिक स्थितीमुळे घडते असे सांगितले जाते.
गुरूत्वाकर्षनाचा नियम इथं होतो फेल
शास्त्रज्ञ न्यूटन यांनी पृथ्वीतील गुरूत्वाकर्षणाचा नियम शोधला होता. त्यामध्ये प्रत्येक गोष्ट खालीच पडते, याला हा नियम लागू होतो, असे त्यांनी सांगितले आहे. पण, छत्तीसगडमधल्या या ठिकाणी केवळ पाणीच नाहीतर गाडीही घसरतीला कशी घसरते तसे गाडीही जाते.

इथे असलेल्या वाहत्या पाण्यात तुम्ही एखादा कागद किंवा पान टाकले तर ते वरच्या दिशेला वाहत जाते. हे आश्चर्यच असल्याचे मानले जाते.
महाराष्ट्र राज्यातील दुसरे 21 फूट जमिनीखाली असलेले अनोखे गणेश मंदिर; काय आहे खासियत?
फुलारे चॅरिटेबल ट्रस्ट हा सामाजिक उपक्रम सातत्याने राबवित असतो. या ट्रस्टचे श्री गणेश मंदिरासोबत वाघोली गावात सुमारे बारा एकराच्या विस्तीर्ण जागेत शनी मंदिर आहे.
विरार : महाराष्ट्रातील दुसरे तर पालघर जिल्ह्यातील पहिले व एकमेव असे जमिनीखाली असलेले गणपतीचे आगळे-वेगळे मंदिर सध्या पहायला वसईत गर्दी होत आहे. नालासोपारा पश्चिम वाघोली (Wagholi) येथील जयवंत नाईक व किशोर नाईक बंधू यांच्या फुलारे चॅरिटेबल ट्रस्ट (Fulare Charitable Trust) संचालित हे श्री गणेश ध्यान मंदिर (Ganesha Temple) असून येणा-या भाविकांना या मंदिराच्या गाभाऱ्यात ध्यानधारणा तसेच गणेशाची उपासना, आवर्तन करता येणार आहे.
एकवीस वर्षांपूर्वी नाईक बंधूंनी आपल्या वडिलोपार्जित शेतीवाडीत या गणेश मंदिराची उभारणी केली आहे. मुंबईपासून अवघ्या तासाभराच्या अंतरावर कोकणात किंवा गोव्याला गेल्याचा फील देणारा वसई-विरार (Vasai-Virar) पट्टा आहे. वाघोलीचा परिसर हा हिरवाई , निसर्गसौंदर्याने नटलेला आहे. अर्नाळा, कळंब ,राजोडी समुद्रकिनारी मोठ्या संख्येने पर्यटक सध्या येत असून या पर्यटकांची (Tourists) पावले आता वाघोली गावाकडे वळू लागली आहेत.
फुलारे चॅरिटेबल ट्रस्ट हा सामाजिक उपक्रम सातत्याने राबवित असतो. या ट्रस्टचे श्री गणेश मंदिरासोबत वाघोली गावात सुमारे बारा एकराच्या विस्तीर्ण जागेत शनी मंदिर आहे. आकाशाच्या निळ्या छत्राखाली एका उघड्या रिंगणाच्या मधोमध शिंगणापूरसारखी स्वयंभू शनीच्या शिळेची प्रतिकृती आहे. भाविक तिथे स्वहस्ते तेलाचा अभिषेक करू शकतात. तेलविक्री बचत गटाच्या महिलांमार्फत केलेली आहे. अभिषेकासाठी वापरले गेलेले हे तेल वाया न घालवता व्यवस्थित रिसायकल करून त्यात औषधी वनस्पतींचे अर्क मिसळून वृद्धांना व रुग्णांना मालिशसाठी विनामुल्य प्रसाद रूपाने वाटले जाते.
शनिदेवाची प्रतिमा असलेले मंदिर प्रशस्त आणि आकर्षक आहे. लाकडापासूनचे उत्तम कौलारू काम यांची फार सुरेख रचना बांधकामासाठी केलेली आहे. आयुष्यभर कष्ट करून थकलेल्या वृद्धांच्या दुखर्या पायांना घडीभर आराम देणारी, पाय दाबून देणारी यंत्रे विनामूल्य उपलब्ध केलेली आहेत. बिना दरवाजाचे गाव म्हणून प्रसिद्ध असलेल्या शनी शिंगणापूरला जाणे जमत नसल्याने वसईकरांना फुलारे-नाईक परिवाराच्या शनि मंदिर सोयीचे ठिकाण ठरले आहे.
शनिमंदिरातून भाविकांना दिलेली प्रसादरूपी फुल-झाड म्हणजे पर्यावरणाचे महत्व जाणून झाडे लावा व झाडे जगवा यासाठी राबवलेला सामाजिक उपक्रमच म्हणावा लागेल. शनिमंदिराचे जयवंत फुलारे- नाईक यांनी यासाठी थोडीथोडकी नव्हे तर तब्बल ५ लाखांहूनही अधिक फुले व फळझाडांचे मोफत वाटप करत निर्सगाचा समतोल राखण्यासाठी हातभार लावला आहे.
शनिमंदिर व फुलारे ट्रस्टद्वारे आरोग्य व रक्तदान शिबीरे, विद्यार्थांना शैक्षणिक साहित्य वाटप, खाद्य-नाट्यसंगीत महोत्सव, एकांकीका स्पर्धा, क्रीडा स्पर्धा अशा विविध सामाजिक, धार्मिक व सांस्कृतिक विषय वर्षभर राबवत असतात. मंदिर परिसरात सामवेदी खाद्य पदार्थांचा आस्वाद भाविकांना घेता येतो. या परिसरात श्री संत सद्गुरू बाळु मामा व श्री विठ्ठल रखुमाई माताचे मंदिर उभारण्यात आले आहे. दर अमावस्येला बाळु मामांच्या नावाने भंडारा असतो.
Cat's Temple : या आयलंडवर आहे मांजरांचे मंदिर, माणसांपेक्षा मांजरेच आहेत जास्त
Cat's Temple :
जगभरात अनेक मंदिरे अशी आहेत ज्याचा आपण विचारच करू शकत नाही. कोणी आवडत्या अभिनेत्याचे मंदिर बांधतो. तर कोणी एखाद्या देशसेवा करणाऱ्या सैनिकाचे. संत महात्मे, धर्माचा प्रसार करणारे लोकांची मंदिरे बनतात. पण, जपानमध्ये मात्र एका मांजराचे मंदिर बांधण्यात आले आहे. केवळ मंदिर नाहीतर ज्या ठिकाणी हे मंदिर आहे तिथे सर्वत्र मांजरेच आहेत.
जपानच्या ईशान्येला एक बेट आहे, जिथे माणसांपेक्षा जास्त मांजरी राहतात. येथे मांजरी संरक्षकांची भूमिका बजावतात. जपानमधील ताशिरोजिमा बेटावर मांजरींच्या सन्मानार्थ 'नेको निन्जा' नावाचे मंदिर आहे. जे बेटवासी आणि मांजरी यांच्यातील सुंदर नाते दर्शवते.
या मंदिरामागे अशी कथा सांगितली जाते की, पूर्वीच्या जमान्यात इथले नागरिक रेशीम उत्पादन करायचे. ताशिरोजिमाचे पूर्ण बेट हे रेशीम उत्पादन करत होते. पण या शेतकऱ्यांना इथली उंदरे त्रास द्यायचे. त्यामुळे शेतकऱ्यांनी त्यांच्या मौल्यवान रेशीम किड्यांचे उंदरांपासून संरक्षण करण्यासाठी मांजरी पाळल्या.
इथले मछ्चिमारही मांजरीला सोबत घेऊन मासे पकडण्यासाठी जायचे. त्यांचे असे म्हणणे होते की, यामुळे नशीब फळफळते आणि अधिक मासे पकडण्यात मदत होते, असा येथील मच्छिमारांचा विश्वास होता.

आणि अशा प्रकारे मंदिर बांधले गेले
समुद्रात जाण्यापूर्वी हवामानाचा अंदाज घेण्यासाठी मच्छिमार मांजरांच्या हालचालींवर लक्ष ठेवून असत. असे म्हणतात की मांजर आणि येथे राहणारे लोक यांचे नाते पिढ्यानपिढ्यांचे आहे. एकदा एका मच्छिमाराने एका मांजरीला चुकून जखमी केले. त्यात ती मृत्यूमुखी पडली. त्यानंतर बेटवासीयांनी मिळून मांजरीच्या सन्मानार्थ मंदिर बांधले. या घटनेनंतर मांजर आणि बेटवासी यांच्यातील नातं आणखी घट्ट झालं.

अद्वितीय संस्कृती अजूनही टिकून आहे
हे बेट मियागी प्रीफेक्चरमधील इशिनोमाकी शहराचा एक भाग आहे. जो तोहोकू प्रदेशात आहे, ज्याने 2011 मध्ये शक्तिशाली भूकंपानंतर विनाशकारी त्सुनामी पाहिली होती. तथापि, या नैसर्गिक आपत्तीनंतरही, बेटाची अद्वितीय संस्कृती अजूनही टिकून आहे.
माणसांपेक्षा जास्त मांजरी आहेत
आज या छोट्या बेटावर केवळ ५० लोक राहतात. पारंपरिक कामे करून ते आपला उदरनिर्वाह करतात. सध्या ताशिरोजिमा बेटावर १०० हून अधिक मांजरी आहेत.
हेमाडपंती मंदिराचा होणार कायापालट
हेमाडपंती मंदिराच्या पुनर्विकासासाठी १४ कोटींचा निधी मंजूर करण्यात आला आहे. esakal
Mumbai : राहेर येथील हेमाडपंती नृसिंह मंदिर अतिप्राचीन असून, शिल्पकलेचा उत्कृष्ट नमुना आहे. राज्य संरक्षित मंदिर आहे. मात्र, राजकीय अनास्थेमुळे योग नृसिंह मंदिराची मोठ्या प्रमाणात पडझड झाली होती.
मंदिराचे संवर्धन आणि जतन करण्यासाठी राज्य शासनाच्या पर्यटन विभागाने १४ कोटींचा निधी उपलब्ध करून दिल्याने पुरातत्त्व विभागाच्या नियंत्रणाखाली दुरुस्तीचे काम सुरू झाले आहे. त्यामुळे या परिसराचा लवकरच कायापालट होणार आहे.
वास्तू शिल्पाचा उत्कृष्ट नमुना असलेल्या ऐतिहासिक मंदिरे व इतर पुरातन वस्तू जोपासणे व ती नष्ट न होऊ देण्याची जबाबदारी पुरातत्त्व विभागाच्या अधिकारकक्षेत येते, पण या बाबीकडे शासनाचा पुरातत्त्व विभाग जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत असल्याने महाराष्ट्रातील ही ऐतिहासिक वास्तू मोडकळीस आली होती.
चक्रधर स्वामींच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या गोदापात्राच्या तीरावर राहेर येथे हेमाडपंती मंदिराचा अतिशय उत्कृष्ट वारसा नायगाव तालुक्याला लाभला आहे.
हे हेमाडपंती मंदिरात नृसिंहाची देखणी व लोभस मूर्ती असून, याची पूजा-अर्चा व नित्य सेवा करण्याची जबाबदारी राहेर येथील कुलकर्णी परिवाराकडे आहे. ते दररोज पूजा अर्चा व सेवा करतात, पण सध्या या ऐतिहासिक हेमाडपंती मंदिराची मोठी दुरवस्था झाली आहे.
राहेर येथील हे नृसिंह मंदिर हिंदूंचे श्रद्धास्थान असून, नृसिंहाच्या दर्शनासाठी भाविक दुरदूरवरून येतात. पण, मंदिराची झालेली अवस्था पाहून भाविक खंत व्यक्त करतात. हे हेमाडपंती मंदिर शासनाच्या पुरातत्त्व विभागाच्या अखत्यारीत येते. मात्र, पुरातत्त्व विभाग याकडे लक्ष देत नव्हते. अखेर राज्य शासनाने याची दखल घेतली असून, पर्यटन विभागाच्यावतीने १४ कोटी आठ लाखांचा निधी उपलब्ध करून दिला.
नियोजनबद्ध विकास गरजेचा
यापूर्वी शासनाकडून मंदिराच्या विकासासाठी ७७ लाखांचा निधी मिळाला आहे; पण संबंधित गुत्तेदाराने विकासकामांच्या नावाखाली आपले उखळ पांढरे करून घेतले आहे. त्यामुळे मंदिर परिसरात भग्नावस्था प्राप्त झाली होती.
गोदावरी नदी किणाऱ्यावर असलेले नृसिंह मंदिर राज्य संरक्षित असून, या मंदिराचा नियोजनबद्ध विकास केल्यास मोठ्या प्रमाणात पर्यटनाला चालना मिळू शकते.
भारतातल्या या हिल्स स्टेशनवर जाण्यासाठी लागतो E-Pass? जाणून घ्या कसा काढायचा
E-pass for Hill Station:
कोणत्याही ऋतूत हिल स्टेशनवरील वाऱ्याची झुळूक अंगावर घेणं रोमांचक वाटतं. त्यामुळेच, देशातील अनेक हिल्स स्टेशनवर गर्दी पहायला मिळते. उन्हाळ्याच्या सुट्ट्या घालवण्यासाठी लोकांना हिल स्टेशनवर जाणे आवडते. येथे त्यांना उन्हापासून आराम मिळतो. यासोबतच लोकांना भरपूर आनंदही मिळतो.
मात्र उन्हाळ्याच्या काळात हिल स्टेशनवर पर्यटकांची मोठी गर्दी असते. जर तुम्ही उन्हाळ्याच्या सुट्टीसाठी हिल स्टेशनवर जात असाल तर तुम्हाला यासाठी ई-पास आवश्यक आहे. होय, तमिळनाडूच्या हिल्स स्टेशन असलेले उटी किंवा कोडाईकनालला जाणाऱ्या लोकांना आता सोबत ई-पास ठेवावा लागेल. या दोन्ही ठिकाणी ई-पासशिवाय प्रवेश मिळणार नाही.
मद्रास उच्च न्यायालयाच्या विशेष खंडपीठातील न्यायाधीश एन. सतीश आणि बी. भरत चक्रवर्ती यांनी या दोन हिल स्टेशनला भेट देऊ इच्छिणाऱ्या वाहनांसाठी ई-पास जारी करण्यास सांगितले आहे.
उन्हाळ्यात हिल स्टेशनवर पर्यटकांची वाढती गर्दी पाहता हा निर्णय घेण्यात आला आहे. येथे येणाऱ्या पर्यटकांची आकडेवारी उपलब्ध नाही. अशा परिस्थितीत ई-पासद्वारे सर्व लोकांच्या नोंदी ठेवणे शक्य होणार आहे. परंतु आम्ही तुम्हाला सांगतो की या दोन हिल स्टेशनमध्ये प्रवेश करण्यासाठी ई-पासची आवश्यकता 30 जून 2024 पर्यंत लागू राहील. (E-Pass For Hill Stations)
उटी आणि कोडाईकोनालसह निलगिरी जिल्ह्यात प्रवेश करणाऱ्या प्रत्येक व्यक्तीसाठी ई-पास आवश्यक असेल. स्थानिक रहिवासी असो, शेतकरी असो की बाहेरून येणारा पर्यटक – प्रत्येकासाठी ई-पास उपलब्ध करून देण्यात आला आहे.
मात्र तामिळनाडू सरकार प्रत्येकाला वेगवेगळ्या रंगांचे ई-पॅासेस जारी करणार आहे. ई-पास 3 रंगात जारी केला जाणार आहे.
स्थानिक रहिवाशांना हिरव्या रंगाचा ई-पास जारी केला जाईल आणि शेतातून आणि इतर ठिकाणांहून जीवनावश्यक वस्तू घेऊन जाणाऱ्या लोकांना निळ्या रंगाचा ई-पास दिला जाईल. त्याचबरोबर पर्यटकांना जांभळ्या रंगाचे पास दिले जातील.
E-Pass कसा काढायचा?
https://epass.tnega.org वर लॉग इन करा,
देशाच्या नागरिकत्वाच्या आधारावर Within India किंवा Outside India पर्यायावर क्लिक करा
आता मोबाईल नंबर Add करा
OTP भरल्यानंतर रजिस्ट्रेशन प्रक्रिया पूर्ण होईल
यानंतर तुमच्याकडे नाव,पत्ता,किती वेळ थांबणार आहेत ती वेळ, आणि गाडीचा नंबर मागितला जाईल.
पुदुच्चेरीची निसर्गरम्य सफर
भारती भांडेकर
मानवी जीवन आंनददायी बनवायचे असेल तर निसर्गाच्या सान्निध्यात राहून तो बनवू शकतो. निसर्गाच्या अपूर्व व असाधारण अनुभव अपरिमित आनंद देतो. अशाच वैभवाचे साक्षीदार म्हणून मी नुकतेच पुदुच्चेरी ( पॉंडेचरी) येथे भ्रमंती करायला गेले. विशाल समुद्र किनारा, छोटस पण टुमदार शहर, अगदी शांत आणि समाधानी लोक इथे पहायला मिळाले. शहर म्हणाव तर रहदारी, गर्दी म्हणून नव्हती.
या छोट्याशा शहरात पर्यटन स्थळ भरपूर आणि पर्यटकही भरपूर. ओरो व्हीला, साधना फाॅरेसट, जीपमेअर मेडिकल कॉलेज, फ्रॅन्च काॅलनी, मैत्र मंदिर, अरविंद घोष यांचा आश्रम, वाळूच बन, चर्च, विविध मंदिर या सर्वाचा समावेश पहाताना दृष्टी स्तब्ध होते. या शहराच वैशिष्ट्य म्हणजे स्वातंत्र्यापूर्वी आलेले फ्रेंच लोक.
त्यांचे सुंदर, भव्य पॅलेससआणि अजूनही त्यांच इथल्या मातीवरचे वास्तव्य बघितले आपण वेगळ्या विश्वात आलो असेच वाटते. आता अनेक फ्रेंच पॅलेस हे हाॅटेल व्यवसायात आले आहे. या सर्व हाॅटेलमध्ये खास फ्रेंच पदार्थ मिळतात. फ्रेंच लोकांच इथल वास्तव्य बघितल्यानंतर मला सहजच प्रश्न पडला की, त्यांच्या वागण्यात एवढी सहजता कशी काय. तेव्हा कळल की, ते या भारत देशात रहातात. पण त्यांना मतदानाचा अधिकार नाही. पण आपल्या देशात त्यांना व्यवसाय करायला, रहायला आवडत, याच मला कौतुक वाटल.
रोजगाराच्या संधी तशा कमीच पण आनंदी आयुष्याची उर्मी मात्र जबरदस्त. या ठिकाणी मैत्रमंदिर आहे, जिथे १२७ देशातील लोक एकत्र रहातात. त्यांना ना भाषेची अडचण ना खाण्याची. त्यांच्या कीतीतरी पिढ्या इथेच वास्तव्यास आहे. शाळा ही संकल्पनाच इथे नाही. फक्त निसर्गाच्या सान्निध्यात राहून अनुभवातून शिक्षण इथे मिळते.
अनौपचारिक शिक्षण प्रणालीत हे विद्यार्थी घडतात. खरी धर्म निरपेक्षता मला या ठिकाणी पहावयास मिळाली. कोणतीही पदवी नसताना तो आदर्श नागरिक होतो. मैत्रमंदिरात लोक खास मेडिटेशन साठी येतात. अरविंद घोष यांनी हे मैत्रमंदिर निर्माण केले आणि जगात मैत्रीच्या नात्याचा संदेश पोचवला. शाश्वत नात ते फक्त मैत्रीचच. अनेक देशातील लोक एकत्र रहातात पण कुठेही तू तू मै मै नाही. जगावेगळ जगण निसर्गच शिकवत, हेच खर.
अरविंद घोष यांच साधना फॉरेस्ट हे तर जगावेगळच म्हणाव लागेल. ७० एकरमध्ये हे जंगल पसरलेल आहे. सर्व जगातून येथे पर्यावरण प्रेमी येतात. जंगलालाच आपल कुटुंब मानतात. आपल घर मानतात आणि त्या जंगलावर भरभरून प्रेम करतात. या जंगलात लाईट नाही, आधुनिक रस्ते नाही, गॅस नाही की सिंमेटच घर नाही. आपल्या शहरासारखी संडास बाथरूम नाही. राहण्यासाठी इथे कुटीया तयार केल्या आहेत.
या दिवसात उकडलेल अन्न ते खातात. नारळाच्या दूधाचा चहा पितात. कुठेही भेसळ नाही आणि जगण्याची भीती नाही. हे जंगल पाहिल आणि येथे रहाणारे सेवाव्रती पाहिले की, आपण वेगळ्याच विश्वात आलो असे वाटते. ही माणस मोबाइलशिवाय रहातात. अंधारात आनंदाने झोपतात. जंगली प्राण्याची भीती नाही की, सरकारकडून कुठल्याही अपेक्षा नाही. त्यांच्या जगण्याच्या गरजा अत्यल्प म्हणजे नाहीच.
अनेक देशातील लोक जंगलाची सेवा करायला येतात आणि जंगलाच अस्तित्व अबाधित ठेवतात हे विशेष. ही जगावेगळी माणस कर्तव्यनिष्ठ आणि खूप प्रामाणिक वाटली. इथल्या विशाल समुद्र आणि त्या समुद्रात मोरांबी जंगल पहावयास मिळाले. इथे मगरींच वास्तव्य आणि पाण्यातील मोठमोठे साप दिसतात. पण तरीही पर्यटक आवर्जून या समुद्र जंगलात जातात. हे विशाल भव्य अदभूत सौंदर्य पाहून माणूस स्तब्ध होतो. निसर्गाच्या भव्यतेचा हा वेगळा परिचय पर्यटकांना हवाहवासा वाटतो. या शहरातील विविधतेत अरविंद घोष यांचा आश्रम आणि त्यातील अलौकिक वस्तू संग्रहालय तर आपण विसरू शकत नाही.
पाच हजार वर्षांपूर्वीच झाड आजही या आश्रमात पहायला मिळत. अनेक वर्षांचा तो इतिहास आपल्या डोळ्यासमोर उभा रहातो आणि मानवी जनजीवन त्या काळातील उलगडत जाते हे सामर्थ्य त्या आश्रमातील वस्तूंमध्ये पहावयास मिळते. विशाल समुद्र किनाऱ्यासोबत विशाल मानवी नात्याचा वेगळा परिचय या ठिकाणी येतो हे नक्कीच. निसर्गाच्या भव्यतेचा आणि दिव्यतेचा अलौकिक संगम निसर्ग आणि आम्ही हे नात जोडताना जाणवतो.
बिहारमध्ये असलेल्या या कुंडात माता सीतेने दिली होती अग्नि परीक्षा, हे पाणी आजही देते साक्ष
Sita Mata Kund :
रामायणात वनवास भोगत असताना माता सीतेला रावणाने पळवून नेले. त्यानंतर वानरांची सेना बनवून प्रभू श्री रामांनी रावणाचा आणि त्याच्या लंकेचा वध केला. त्यानंतर आदरपुर्वक माता सीतेला घेऊन ते अयोध्या नगरीत परतले.
पण, अयोध्येत परतल्यानंतरही सीता मातेचा वनवास संपला नव्हता. रामायणातील कथांनुसार, सीता मातेला अयोध्येत अग्निपरीक्षा द्यावी लागली होती. जिथे सीता मातेने ही परीक्षा दिली तिथे एक कुंड आहे. ज्याचे पाणी आजही गरम आहे.
होय, रामायणातील पाऊलखुणा दर्शवणाऱ्या इतर ठिकाणांपैकीच बिहारमधील एक कुंड आहे. बिहारमध्ये असलेल्या मुंगेर या ठिकाणी गरम पाण्याचा कुंड आहे. ज्याला सीता माता कुंड असेही म्हणतात.
बिहारच्या मुंगेरमध्ये रामायणाशी
संबंधित अनेक ठिकाणे आहेत. त्यापैकी एक सीता कुंड आहे. असे मानले जाते की
इथे माता सीता निवास करते. तिथे गरम पाण्याचे कुंड तयार झाले आहे त्याचे
पाणी नेहमी गरम असते. या ठिकाणाला रामतीर्थ असेही म्हणतात.
या कुंडातील पाणी नेहमीच गरम का असते हे आजही एक गूढच आहे. या परिसरात माता सीताकुंड सोबत जवळच राम, लक्ष्मण, भरत आणि शत्रुघ्न यांच्या नावाने चार कुंड आहेत. परंतु सीताकुंडाचे पाणी नेहमीच गरम असते. तर इतर चार तलावांचे पाणी थंड आहे. हे अजूनही लोकांसाठी न सुटलेले कोडे आहे.

शास्त्रज्ञांनी केले संशोधन
सीता कुंडातील गरम पाण्याचे रहस्य जाणून घेण्यासाठी वैज्ञानिक वेळोवेळी येथे संशोधनासाठी येतात. मात्र आजतागायत हे गूढ कोणालाच उकलता आलेले नाही. या तलावाची लांबी आणि रुंदी २० फूट तर तलाव १२ फूट खोल असल्याचे सांगण्यात आले.
शास्त्रज्ञांनी एक चाचणी घेतली होती. त्यात असे सांगण्यात आले की येथील पाणी आठ महिने गरम असते. उन्हाळ्यात येथील पाण्याचे तापमान कमी होत असल्याचे त्यांनी सांगितले होते.
उन्हाळ्यात फिरण्यासाठी ऋषिकेशजवळची 'ही' ऑफबीट ठिकाणे आहेत बेस्ट, बजेटमध्ये ट्रीप करा प्लॅन
Travel Diaries : सध्या देशातील अनेक भागांमध्ये उकाडा प्रचंड वाढला आहे. मे महिन्यामध्ये तर उष्णतेची तीव्रता अधिक वाढते. त्यामुळे, या दिवसांमध्ये जर तुम्हाला उकाड्यापासून दूर कुठेतरी फिरायला जायचे असेल तर हा लेख शेवटपर्यंत वाचा.
कारण, आज आम्ही तुम्हाला उन्हाळ्याच्या सुट्टीत फिरायला जाण्यासाठी बेस्ट असलेल्या उत्तराखंड राज्यातील काही ठिकाणांबद्दल सांगणार आहोत. उत्तराखंड हे राज्य पर्यटनासाठी लोकप्रिय आहे. येथील विविध हिलस्टेशन्स पर्यटकांना नेहमीच भुरळ घालतात.
उन्हाळ्यात थंड आणि आल्हाददायक वातावरणात फिरायला जाण्यासाठी उत्तराखंड हा उत्तम पर्याय आहे. उत्तराखंड राज्यात स्थित असलेले ऋषिकेश हे ठिकाण पर्यटनासाठी लोकप्रिय आहे. आज आम्ही तुम्हाला ऋषीकेशजवळील काही सुंदर ठिकाणांबद्दल सांगणार आहोत. चला तर मग जाणून घेऊयात या ठिकाणांबद्दल.
कानातल
उत्तराखंड राज्यातील सुप्रसिद्ध पर्यटनस्थळांमध्ये मसुरी, ऋषिकेश, नैनिताल, मुक्तेश्वर किंवा अल्मोडा इत्यादी ठिकाणांचा समावेश आहे. परंतु, उन्हाळ्यात या ठिकाणी पर्यटकांची प्रचंड गर्दी असते. कानातल हे ऋषिकेशजवळील एक प्रसिद्ध हिल स्टेशन आहे.
या ठिकाणी निसर्गाचा सुंदर नजारा पहायला मिळतो. शिवाय, या ठिकाणी गर्दी ही कमी असते. उंच पर्वत, हिरवीगार जंगले आणि देवदारची झाडे कानातलच्या सौंदर्यात आणखी भर घालतात.
देवरिया ताल
देवरिया ताल हे ठिकाण उत्तराखंडच्या रूद्रप्रयाग जिल्ह्यात स्थित आहे. हे एक लोकप्रिय ठिकाण असून या ठिकाणी सुंदर तलाव आणि घनदाट जंगल आहे. जर तुम्हाला ट्रेकिंगची आवड असेल तर हे ठिकाण तुमच्यासाठी बेस्ट आहे.
उन्हाळ्यातील उकाड्यापासून आराम मिळवण्यासाठी हे उत्तम ठिकाण आहे. या तलावासोबतच, तुम्ही या परिसरातील त्रियुगीनारायण मंदिर, चोपटा, तुंगनाथ इत्यादी ठिकाणे देखील पाहू शकता.
डोडीताल
डोडीताल हे ठिकाण उत्तराखंड राज्यात स्थित आहे. उत्तराखंड राज्यातील उत्तरकाशी जिल्ह्यात हा डोडीताल नावाचा सुंदर तलाव आहे. ऋषिकेशपासून हे ठिकाण सुमारे ९० किमी आहे. हा तलाव पाहिल्यानंतर तुम्हाला नैनितालची आठवण येईल, यात काही शंका नाही.
विशेष म्हणजे या ठिकाणाला पौराणिक महत्व आहे. याच ठिकाणी श्रीगणेशाचा जन्म झाला असे, मानले जाते. त्यामुळे, या ठिकाणाला गणेशताल असे ही म्हटले जाते. येथील थंड वातावरणात तुम्हाला निवांत वेळ घालवता येईल, शिवाय ट्रेकिंग ही करता येईल.
भारतातल्या या मंदिरात मासिक पाळीच्या काळातही महिलांना दिला जातो प्रवेश, केवळ महिलांनाच आहे पुजेचा मान!
Mata Ling Bhairavi Temple : भारत हा मंदिरांचा देश आहे. इथे प्रत्येक गावात किमान १०-१५ मंदिरे आढळतात. इतकेच नाहीतर आपल्या देशात अनेक अतिप्राचिन मंदिरे आहेत. या सगळ्या मंदिरांमध्ये पुरूषमंडळीच पुजारी असतात. देवी-देवतांचा अभिषेक, नित्य पूजा तेच करतात. भारतात असेही एक मंदिर आहे जिथे महिला पुजारी आहेत.
होय तुम्ही बरोबर ऐकलेत, महिला पुजारी आहेत ही नवी गोष्ट नाही. पण, महिलांना मासिक पाळीच्या काळात सुद्धा या मंदिरात प्रवेश दिला जातो. आणि देवीची पूजाही या महिला पाळीच्या काळात करू शकतात. (Mata Ling Bhairavi Temple,Tamilnadu)
खरं तर देशात सर्वत्रच महिलांना येणारी मासिक पाळी अशुद्ध समजली जाते. या काळात महिलांना देवाची पूजा तर सोडाच पण घरात मोकळेपणाने वावरताही येत नाही. कारण, अशा महिलांना घरातील एका वेगळ्या रूममध्ये चार दिवस घालवावे लागतात.
गडचिरोली भागातील भामरागड इथे तर महिलांना पाळीच्या काळात गावापासून दूर असलेल्या झोपडीत रहावं लागतं. त्यांच्यासाठी हा काळ कठीण असतो. अशातच सर्व महिलांना सुखावणारी एक गोष्ट घडत आहे.
ती म्हणजे तामिळनाडूतील कोइंबतूर येथे असलेल्या देवी लिंग भैरवीच्या मंदिरात महिला पूजारी आहेत. कोइंबतूर स्टेशनपासून ३० किलोमीटर अंतरावर सद्गुरू वासुदेव आश्रममध्ये हे मंदिर आहे. या मंदिरातील पुजाऱ्यांना भैरवी म्हणून ओळखले जाते. या मंदिरात देवीची पूजा, नित्य अभिषेक, सजावट, देवीचा पोषाख आरती हे सगळेच महिला पूजारी करतात.
इतकेच नाहीतर या मंदिरात मासिक पाळी झालीय म्हणून कोणा महिलेला प्रवेश नाकारला जात नाही. प्रत्येक महिला ही देवीचेच रूप आहे अशी समजूत इथल्या स्थानिक लोकांमध्ये असल्याने ते महिलांना थांबवत नाहीत.
पुरूषांना प्रवेश नाही
इतरत्र महिलांना प्रवेश नाही असे बोर्ड देशातील मंदिरांमध्ये दिसतात. मात्र, भैरवी मातेच्या या मंदिरात पुरूषांना प्रवेश नाही. तसेच, देवीच्या मंदिरात येणाऱ्या महिलांना गाभाऱ्यातही प्रवेश दिला जातो.
विदर्भातील मनसरचा प्राचीन बौद्ध स्तूप ‘अवश्य पाहा’ स्थळांच्या यादीत
Must See Heritage : मनसर येथे उत्खननात सापडलेले प्राचीन बौद्ध स्तूप आता भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षण विभागाच्या ‘मस्ट सी हेरिटेज’ (स्मारक पहायलाच हवे)च्या यादीत समाविष्ट झाले आहे. विभागाने ‘आवर्जून पहावा’ असे आवाहनही केले आहे.
भारतात प्राचीन स्मारके, वारसा स्थळांचा वेगळा इतिहास, सांस्कृतिक कला आणि वैभव आहे. मात्र, याबाबत बहुतांश भारतीयांना, देश-विदेशातील पर्यटक आणि इतिहास अभ्यासकांना माहिती नसते. त्यामुळे भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षण विभागाने देशभरातील वारसा स्थळांचे सर्वेक्षण करून ‘मस्ट सी हेरिटेज'' स्थळांची यादी तयार केली आहे. या माध्यमातून पर्यटकांना स्थळे पाहण्याचे आवाहनही केले आहे.
विदर्भातील स्थळे
नागपूर रामटेक मार्गावरील मनसर गावातील प्राचीन बौद्ध स्तूप प्रसिद्ध आहे. पर्यटक व इतिहास अभ्यासक येथे भेट द्यायला येतात. त्यामुळे पुरातत्त्व विभागाने ऐतिहासिक महत्त्व ओळखून ‘मस्ट सी मॉनुमेंट्स’ यादीत या स्तुपाचा समावेश केला आहे. सोबतच अमरावतीच्या चिखलदरा येथील गाविलगड किल्ला आणि बुलडाणा जिल्ह्यातील लोणार येथील १५ मंदिरे ही विदर्भातील तीन स्थळे पुरातत्त्व विभागाच्या ‘आवर्जून पाहायलाच’ हवीच्या यादीत समावेश केला आहे.
२१ राज्यांतील महत्त्वाच्या स्थळांचा समावेश
भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षण विभागाने ‘मस्ट सी हेरिटेज’ अशा स्मारकांची यादी वेबसाईटवर प्रसिद्ध केली. यात २१ राज्यांतील महत्त्वाची स्थळे समाविष्ट आहेत. ही यादी https://asimustsee.nic.in/index.php या वेबसाईटवर उपलब्ध आहे.
स्मारकाला कशी भेट द्याल ?
मनसर येथील प्राचीन बौद्ध स्तुपाला कशी भेट देता येईल, याची संपूर्ण माहिती वेबसाईटवर दिली आहे. जवळचे विमानतळ, रेल्वे स्टेशन, बस स्थानक, कोणत्या हंगामात जाणे योग्य आहे. कोणत्या सुविधा मिळतील, इतकेच नाही तर स्तुपाची सविस्तर माहिती आणि छायाचित्रे उपलब्ध करून दिली आहे. ‘मस्ट सी मॉन्युमेंट्स’च्या सर्व स्थळांची अशी माहिती वेबसाईटवर उपलब्ध आहे.
‘मस्ट सी हेरिटेज’ च्या यादीत विदर्भातील तीन स्थळांचा समावेश ही चांगली बाब असली तरी विदर्भात आणखी बरीच प्राचीन वारसा स्थळे आहेत. त्यांचा सुद्धा समावेश व्हायला हवा.
- प्रा. डॉ. चंद्रशेखर गुप्त, (माजी विभाग प्रमुख- प्राचीन भारतीय इतिहास, संस्कृती व पुरातत्त्वशास्त्र, रातुम नागपूर विद्यापीठ)
विदर्भातील मनसरचा प्राचीन बौद्ध स्तूप ‘अवश्य पाहा’ स्थळांच्या यादीत
Must See Heritage : मनसर येथे उत्खननात सापडलेले प्राचीन बौद्ध स्तूप आता भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षण विभागाच्या ‘मस्ट सी हेरिटेज’ (स्मारक पहायलाच हवे)च्या यादीत समाविष्ट झाले आहे. विभागाने ‘आवर्जून पहावा’ असे आवाहनही केले आहे.
भारतात प्राचीन स्मारके, वारसा स्थळांचा वेगळा इतिहास, सांस्कृतिक कला आणि वैभव आहे. मात्र, याबाबत बहुतांश भारतीयांना, देश-विदेशातील पर्यटक आणि इतिहास अभ्यासकांना माहिती नसते. त्यामुळे भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षण विभागाने देशभरातील वारसा स्थळांचे सर्वेक्षण करून ‘मस्ट सी हेरिटेज'' स्थळांची यादी तयार केली आहे. या माध्यमातून पर्यटकांना स्थळे पाहण्याचे आवाहनही केले आहे.
विदर्भातील स्थळे
नागपूर रामटेक मार्गावरील मनसर गावातील प्राचीन बौद्ध स्तूप प्रसिद्ध आहे. पर्यटक व इतिहास अभ्यासक येथे भेट द्यायला येतात. त्यामुळे पुरातत्त्व विभागाने ऐतिहासिक महत्त्व ओळखून ‘मस्ट सी मॉनुमेंट्स’ यादीत या स्तुपाचा समावेश केला आहे. सोबतच अमरावतीच्या चिखलदरा येथील गाविलगड किल्ला आणि बुलडाणा जिल्ह्यातील लोणार येथील १५ मंदिरे ही विदर्भातील तीन स्थळे पुरातत्त्व विभागाच्या ‘आवर्जून पाहायलाच’ हवीच्या यादीत समावेश केला आहे.
२१ राज्यांतील महत्त्वाच्या स्थळांचा समावेश
भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षण विभागाने ‘मस्ट सी हेरिटेज’ अशा स्मारकांची यादी वेबसाईटवर प्रसिद्ध केली. यात २१ राज्यांतील महत्त्वाची स्थळे समाविष्ट आहेत. ही यादी https://asimustsee.nic.in/index.php या वेबसाईटवर उपलब्ध आहे.
स्मारकाला कशी भेट द्याल ?
मनसर येथील प्राचीन बौद्ध स्तुपाला कशी भेट देता येईल, याची संपूर्ण माहिती वेबसाईटवर दिली आहे. जवळचे विमानतळ, रेल्वे स्टेशन, बस स्थानक, कोणत्या हंगामात जाणे योग्य आहे. कोणत्या सुविधा मिळतील, इतकेच नाही तर स्तुपाची सविस्तर माहिती आणि छायाचित्रे उपलब्ध करून दिली आहे. ‘मस्ट सी मॉन्युमेंट्स’च्या सर्व स्थळांची अशी माहिती वेबसाईटवर उपलब्ध आहे.
‘मस्ट सी हेरिटेज’ च्या यादीत विदर्भातील तीन स्थळांचा समावेश ही चांगली बाब असली तरी विदर्भात आणखी बरीच प्राचीन वारसा स्थळे आहेत. त्यांचा सुद्धा समावेश व्हायला हवा.
- प्रा. डॉ. चंद्रशेखर गुप्त, (माजी विभाग प्रमुख- प्राचीन भारतीय इतिहास, संस्कृती व पुरातत्त्वशास्त्र, रातुम नागपूर विद्यापीठ)
भारतातल्या या मंदिरात केली जाते श्री हनुमंतांची पत्नीसोबत पूजा, मंदिराचे महत्त्वही आहे खास
Hanuman Jayanti 2024 :
महाबली श्री हनुमंतांची जयंती लवकरच साजरी होणार आहे. श्री हनुमंतांना आपण बालब्रह्मचारी म्हणून ओळखतो. गावागावतल्या पारावर, मोठ्या मोठ्या मंदिरांच्या बाहेरील कट्ट्यावर मारूतीरायांचा फोटो, मूर्ती पहायला मिळते.
गावागावातही मारूतीरायांची मंदिरे आहेत जिथे मारूतीराय एकटेच असतात. पण आपल्या भारतात असेही एक मंदिर आहे जिथे मारूतीराय त्यांच्या पत्नीसोबत विराजमान आहेत. होय, तुम्ही बरोबर ऐकलेत.
तेलंगणातील खम्मम जिल्ह्यात हनुमानजी आणि त्यांची पत्नी सुरवाचला यांची पूजा केली जाते. येथे बांधलेले हे जुने मंदिर वर्षानुवर्षे लोकांच्या श्रद्धेचे स्थान आहे. स्थानिक लोक जेष्ठ शुद्ध दशमीला हनुमानजींचा विवाह साजरा करतात. मात्र, उत्तर भारतात राहणाऱ्या लोकांसाठी हे आश्चर्यापेक्षा कमी नाही. कारण हनुमानजींना बाल ब्रह्मचारी मानले जाते.

या विवाहामागे अशी आहे पौराणिक कथा
श्री हनुमंतांनी सूर्यदेवाला आपला गुरू मानले होते. सूर्य देवाला ९ दैवी ज्ञान होते. बजरंग बली यांना या सर्व शास्त्रांचे ज्ञान मिळवायचे होते. सूर्यदेवाने या ९ विद्यांपैकी ५ विद्या हनुमानजींना दिल्या, परंतु उरलेल्या 4 विद्यांबाबत सूर्यासमोर समस्या निर्माण झाली.
उर्वरित ४ दैवी शास्त्रांचे ज्ञान केवळ विवाहित शिष्यांनाच देता आले. हनुमानजी बाल ब्रह्मचारी होते. त्यामुळे सूर्यदेव त्यांना उर्वरित चार शास्त्रांचे ज्ञान देऊ शकले नाहीत. ही समस्या सोडवण्यासाठी सूर्यदेवाने हनुमंतांना लग्न करण्यास सांगितले.
आधी हनुमानजी लग्नाला तयार नव्हते. पण त्यांना उरलेल्या ४ विद्यांचे ज्ञान मिळवण्यासाठी ते लग्नाला तयार झाले, अशी कथा पुराणात आहे.

हनुमंतांची संमती मिळाल्यानंतर सूर्यदेवाने शक्तीने एका कन्येला निर्माण केले. तिचे नाव सुवर्चला होते. सूर्यदेवाने हनुमानजींना सुवर्चलासोबत लग्न करण्यास सांगितले. सूर्यदेवांनी असेही सांगितले की, सुवर्चलासोबत लग्न करूनही तू नेहमीच बाल ब्रह्मचारी राहशील, कारण लग्नानंतर सुवर्णचला पुन्हा तपश्चर्येत मग्न होईल.
हिंदू मान्यतेनुसार, सुवर्चलाचा जन्म कोणत्याही गर्भातून झाला नाही, त्यामुळे तिच्याशी लग्न करूनही हनुमानजींच्या ब्रह्मचर्यामध्ये कोणताही अडथळा आला नाही. आणि बजरंग बलीला नेहमी ब्रह्मचारी म्हटले जाते.
आनंद महिंद्रांना देखील भावतोय महाराष्ट्राचा माऊंट एव्हरेस्ट, 'या' शिखराला कशी भेट द्यायची ?
Kalsubai Peak : महाराष्ट्राचे ‘माऊंट एव्हरेस्ट’ अशी खास ओळख असलेले कळसूबाई शिखर पर्यटकांचे प्रमुख आकर्षण आहे. दरवर्षी देश-विदेशातील असंख्य पर्यटक या ठिकाणी भेट देण्यासाठी येतात. पावसाळ्यात तर येथील नजारा नयनरम्य असा असतो.
नुकतीच या कळसूबाई शिखराला प्रसिद्ध उद्योगपती आनंद महिंद्रा (anand mahindra) यांनी भेट दिली होती, याचा व्हिडिओ देखील त्यांनी सोशल मीडियावरील प्लॅटफॉर्म एक्सवर शेअर केला होता. कळसूबाई शिखराला भेट देण्याचा अनुभव त्यांनी या व्हिडिओतून व्यक्त केला होता.
हा व्हिडिओ शेअर करताना त्यांनी कॅप्शनमध्ये म्हटले होते की, ‘मी अनेकदा इगतपुरीला आलो आहे. परंतु, मला कधीच या ठिकाणाबद्दल, त्याच्या सौंदर्याबद्दल ऐकायला मिळाले नव्हते. आपण सर्वांनीच आयुष्यात एकदा तरी या ठिकाणाला भेट देण्यासाठी वेळ काढायला हवा’ अशा शब्दांमध्ये त्यांनी कळसूबाई शिखराचे अप्रतिम वर्णन केले होते.
आज आपण याच कळसूबाई शिखराबद्दल जाणून घेणार आहोत. यंदाच्या सुट्टीत तुम्ही देखील मुलांसोबत आणि कुटुंबासोबत या ठिकाणी फिरायला जाऊ शकता. या ठिकाणी कसे जायचे? चला तर मग जाणून घेऊयात.
कळसूबाई शिखर
कळसूबाई शिखर महाराष्ट्रातील अहमदनगर जिल्ह्यातील अकोला तालुक्यात स्थित आहे. कळसूबाई हे शिखर महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखर आहे. महाराष्ट्राचे 'माऊंट एव्हरेस्ट' अशी या ठिकाणाची खास ओळख आहे. समुद्रसपाटीपासून या शिखराची उंची तब्बल ५४०० एवढी आहे. या शिखराच्या टोकावर गेल्यावर तुम्हाला निसर्गाचा अप्रतिम नजारा दिसतो. जर तुम्हाला ट्रेकिंगची आवड असेल तर तुम्ही या ठिकाणाला एकदा नक्की भेट द्या. (Kalsubai Peak)
कळसूबाई शिखराला कसे जायचे?
मुंबईहून कळसूबाई पर्वतावर जाण्यासाठी कसारापर्यंत लोकल ट्रेन धावते. तुम्ही ट्रेन किंवा थेट बसने अहमदनगर किंवा अकोल्यापर्यंत जाऊ शकता. त्यानंतर, तुम्ही जीपच्या मदतीने बारी गावात पोहचू शकता.
या व्यतिरिक्त पॅसेंजर ट्रेनच्या मदतीने तुम्ही इगतपुरीलाही जाऊ शकता. इगतपुरीला गेल्यानंतर, शेअरिंग टॅक्सीच्या मदतीने तुम्ही कळसूबाई शिखरापर्यंत जाऊ शकता. कळसूबाई शिखराच्या पायथ्याशी बारी हे गाव आहे. या गावातूनच कळसूबाई शिखरावर जाण्याचा रस्ता आहे. (How to reach Kalsubai peak?)
युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत झालाय अद्भुत अशा या हिंदू मंदिरांचा समावेश, पहा फोटो
Hoysala Temple : होयसळा स्थापत्य ही हिंदू मंदिर स्थापत्य कलेतील इमारत शैली आहे जी होयसला साम्राज्याच्या राजवटीत 11व्या आणि 14व्या शतकादरम्यान विकसित झाली होती. आज भारतातील कर्नाटक राज्यात 13 व्या शतकात दक्षिणेकडील दख्खनच्या पठारावर वर्चस्व असताना होयसाला प्रभाव शिखरावर होता.
या कालखंडात बांधलेली मोठी आणि छोटी मंदिरे होयसाळ स्थापत्यशैलीची उदाहरणे आहेत. ज्यात बेलूर येथील चेन्नकेसव मंदिर हळेबिडू येथील होयसाळेश्वर मंदिर आणि सोमनाथपुरा येथील केसवा मंदिर यांचा समावेश आहे. यापैकी आता चन्नकेशव मंदिराचा युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळांमध्ये समाविष्ट करण्यात आली आहेत.
कर्नाटकातील तीन होयसळा काळातील मंदिरे नुकतीच ‘सेक्रेड एन्सेम्बल्स ऑफ द होयसळास’च्या एकत्रित नोंदी अंतर्गत, युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत समाविष्ट करण्यात आली आहेत.
12व्या शतकात बांधलेले हे मंदिर जागतिक वारसा यादीत समाविष्ट होणारे भारतातील 42 वे स्मारक आणि कर्नाटकचे चौथे स्मारक आहे. तुम्हालाही या मंदिरांचे सौंदर्य पाहायचे असेल तर जाणून घेऊया या मंदिरांची खासियत काय आहे. ही मंदिरे आणि इथे कसे जायचे.

कर्नाटकातील होयसाळ मंदिरे हे त्याचे अतिशय सुंदर उदाहरण आहेesakal
होयसाळ राजघराणं
होयसाळ राजवंशाच्या राज्यात बांधले गेलेले मंदिर म्हणून यांची खास ओळख आहे. होयसाळ घराण्याने त्यांच्या कारकिर्दीत अनेक मंदिरे आणि धार्मिक स्थळे बांधली. कर्नाटकातील होयसाळ मंदिरे हे त्याचे अतिशय सुंदर उदाहरण आहे.
होयसाळ मंदिरे इतकी सुंदर आहेत की तिथल्या दगडात काव्य लिहिलेले असते. ते द्रविडीयन आणि नागारा शैलींचे बांधकाम पाहण्यास मिळते.

या मंदिरांचा परिसर एक सकारात्मक उर्जा देतोesakal
होयसाळ मंदिरे बेलूर येथे स्थित चन्नकेसव मंदिर हे इतर मंदिरांपैकी सर्वात मोठे आहे आणि ते भगवान विष्णूला समर्पित आहे. हळेबिडूचे होयसलेश्वर मंदिर भगवान शिवाला समर्पित आहे. केशव मंदिर यापेक्षा लहान आहे पण त्याचे सौंदर्य पाहण्यासारखे आहे.
या मंदिरांच्या भिंतींवर विविध देवी-देवतांच्या मूर्ती कोरलेल्या आहेत. या मंदिरांचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे ते झिग-झॅगच्या आकारात बांधलेले आहेत.
आपण आणखी काय पाहू शकता?
या तीन मंदिरांव्यतिरिक्त, केदारेश्वर मंदिर, गोरूर धरण, बसदी हल्ली, पुरातत्व संग्रहालय, श्रावणबेळगोला यांसारख्या इतर अनेक पर्यटन स्थळांनाही तुम्ही भेट देऊ शकता. केदारेश्वर मंदिर हा होयसाळ मंदिराचा एक भाग आहे. येथे असलेली नंदीची मूर्ती या मंदिराच्या सौंदर्यात भर घालते.

केदारेश्वर मंदिर हा होयसाळ मंदिराचा एक भाग आहेesakal
श्रवणबेळगोला हे दक्षिण भारतातील प्रमुख जैन तीर्थक्षेत्र आहे. बसडी हल्लीमध्ये तीन अतिशय प्रसिद्ध जैन मंदिरे आहेत - पार्श्वनाथ स्वामी मंदिर, आदिनाथ स्वामी मंदिर आणि शांतीनाथ स्वामी मंदिर. या महत्त्वाच्या ठिकाणांना भेट देण्याचा आनंदही तुम्ही घेऊ शकता.
होयसाळ मंदिरात कसे जायचे
हि मंदिरे म्हैसूरपासून 150 किमी आहे. म्हैसूरहून इथे पोहोचायला तीन तास लागतात. ट्रेन किंवा फ्लाइटने तुम्ही इथे सहज पोहोचू शकता. याशिवाय बंगलोरहूनही तुम्ही इथे सहज येऊ शकता. इथून होलबिडूला पोहोचायला ४ तास लागतात.

हि मंदिरे म्हैसूरपासून 150 किमी आहेesakal
ऐतिहासिक वीरगळांचे माहेरघर - वेळापूर
नितीन अणवेकर, इतिहास अभ्यासक, सोलापूर
वेळापूर येथे ऐतिहासिक वीरगळांचे संग्रहालय आहे. युद्धात धारातीर्थी पडलेल्या वीरांचे ऐतिहासिक प्रसंग संग्रहालयामधील वीरगळांवर कोरलेले आहेत. असे दीडशेहून अधिक वीरगळ संग्रहालयामध्ये आहेत. याशिवाय येथील अर्धनारी नटेश्वराचे मंदिर शिल्पकलेचा उत्कृष्ट नमुना आहे. याच मंदिरातील हर गौरीची दुर्मिळ मूर्ती विशेष लक्षवेधी आहे.
माळशिरसपासून 18 कि.मी. अंतरावर वेळापूर हे ऐतिहासिक गाव वसलेले आहे. गावास ऐतिहासिक घटनांची जणू परंपराच लाभली आहे. सिंदखेड येथील लखूजी जाधव यांच्या घराण्यातील खंडोजी जाधव यांना सन 1666 मध्ये आदिलशहाकडून वेळापूर गाव इनाम मिळाले, अशी नोंद कागदपत्रांतून दिसून येते.
गावाच्या मध्यवर्ती भागात अर्धनारी नटेश्वराचे मंदिर आहे. मंदिराचा परिसर विस्तीर्ण असून, त्यात अनेक स्वतंत्र मंदिरे आहेत. प्रांगणाच्या समोरच भव्य चौकोनी आकाराची विपुल पाणी असलेली बारव आहे. बारवाच्या पायऱ्यांशेजारी एक यादव काळातील शिलालेख आहे. शालिवाहन शके 1227 मध्ये मार्गशीर्ष शुद्ध पंचमीच्या दिवशी सोमवारी यादव राजा रामचंद्र देव याचा अधिकारी ब्रह्मदेव राणा याने श्री वटेश्वर महादेव मंदिराचा जीर्णोद्धार केला, असे कोरलेले आहे. त्या शिलालेखासमोर आयताकृती सभामंडप आहे. गर्भगृहात शिवलिंग आहे.
याच मंदिराच्या मागे नंदी मंडप आहे. त्यासमोर भाविक भक्तगणांना राहण्यासाठी ओवऱ्या देखील आहेत. ओवरीत शिलालेख आहे. या शिलालेखात यादवांचा राजा रामचंद्र देव याचा अधिकारी श्री जोईदेव याचा सहकारी ब्रह्मदेव राणा याचा भाऊ बोईदेव राणा यांनी मंदिराजवळ मठ व ओवऱ्या बांधल्या, असे नमूद आहे. मंदिरावर चालुक्य स्थापत्य शैलीचा प्रभाव दिसून येतो. मुखमंडप, सभामंडप, अंतराळ व गर्भगृह अशी मंदिराची रचना आहे.
सभामंडपाच्या मध्यभागी नंदी आहे. सभामंडपात दोन सप्तमातृका शिल्पपट आहेत तसेच गणपती, महिषासुरमर्दिनी, चामुंडा देवी, सरस्वती देवीची मूर्ती आहे. गर्भगृहाच्या प्रवेशद्वारावर गजलक्ष्मी आहे. मुख्य गर्भगृहाच्या पीठावर हर गौरीची आलिंगन मुद्रेतील अत्यंत दुर्मिळ मूर्ती आहे. मूर्तीची प्रभावळ कीर्तिमुखाने सुशोभित केलेली आहे.
तिच्या दोन्ही बाजूस अष्टदिकपाल कोरलेले आहेत. शिवाच्या हातात त्रिशूळ, जपमाळा, पाच फण्यांचा नाग दिसून येतो. हर गौरीची मूर्ती अलंकारांनी सजवलेली आहे. शिवाच्या पायाजवळ नंदी आहे. तर गौरीच्या पायाजवळ तिचे वाहन घोरपड आहे. तिच्या शेजारी गणपती आहे. अशी विलोभनीय हर गौरीची मूर्ती राज्यात एकमेव आहे.
याच मंदिरासमोर वीरगळांचे संग्रहालय आहे. ते पुरातत्त्व खात्याच्या अधीन आहे. वेळापूर, म्हाळुंग, तोंडले, बोंडले परिसरातील सुमारे 150 हून अधिक वीरगळ या संग्रहालयात जतन करून ठेवण्यात आले आहेत. हे सोलापूर जिल्ह्यातील एकमेव वीरगळ संग्रहालय आहे. तेथून काही अंतरावर वटेश्वराचे महादेव मंदिर व जैन मंदिर आहे.
गावात भव्य वेस आहे. वेशीसमोर काळा मारुती मंदिर आहे. गावाबाहेरील बाजूस खंडोबा मंदिर आहे. मंदिराच्या प्रांगणात महादेव व काही मूर्ती दिसून येतात. शेजारी दीपमाळा व ओवऱ्याही आहेत. तेथून काही अंतरावर यादव काळातील मंदिर आहे. त्यास स्थानिक लोक गणिकेचा महाल म्हणतात. त्याशेजारी विस्तीर्ण तळे आहे. हा परिसर अत्यंत निसर्गसौंदर्याने नटलेला आहे. याच मंदिरासमोर तीन मुखमंडप असलेले भैरवाचे मंदिर वास्तुकलेचा उत्कृष्ट नमुना आहे. तिच्या शेजारी मोठी विश्रांतिका आहे, ती आजही सुस्थितीत आहे.
आमच्या वेळापुरात खूप वीरगळ आहेत. त्यांचे संग्रहालय देखील आहे. त्यामुळे वीरगळांचे गाव म्हणून वेगळी आहे. अर्धनारी नटेश्वर मंदिरामध्ये राज्यातील दुर्मिळ अशी हर गौरीची मूर्ती आहे, याचा आम्हास अभिमान वाटतो. राज्यभरातून वर्षभर असंख्य पर्यटक येथे येतात. त्यामुळे त्यांना सुविधा मिळाव्यात यासाठी येथे राज्य सरकारच्या वतीने पर्यटन निवास व्हावे, अशी आमची अपेक्षा आहे.
- रजनीश बनसोडे, सरपंच, वेळापूर
हत्तरसंग कुडलचा वारसा सर्वोत्तम
जिल्ह्यात सर्वोत्तम ऐतिहासिक वास्तूमध्ये हत्तरसंग कुडल व कोरवलीचे महादेव मंदिराचा समावेश करावा लागणार आहे. या शिवाय सोलापूरचा भुईकोट किल्ला व त्यातील मल्लिकार्जुन मंदिर, अकलूजचा किल्ला ही स्थळे देखील विकसित करण्याची गरज आहे.
जिल्ह्यातील ऐतिहासिक वारसास्थळे म्हणून अनेक महत्त्वाची स्थळे आहेत. त्यापैकी पंढरपूरचे विठ्ठल मंदिर व हत्तरसंग कुडलचे मंदिराची देखभाल पुरातत्त्व विभागाकडून केली जात आहे. पण प्रत्यक्षात कोरवलीच्या महादेव मंदिराकडे होणारे दुर्लक्ष हे अक्षम्य आहे. या मंदिरावरील शिल्पकला निव्वळ अप्रतिम आहे. या शिवाय माळशिरस तालुक्यातील जमिनीखालील सर्वात मोठे जैन मंदिर हे देशात एकमेव आहे. सोलापूर शहरातील भुईकोट किल्ल्यासह त्यातील मल्लिकार्जुन मंदिर व शहरातील मल्लिकार्जुन मंदिर हे कलासंपन्नतेचा आविष्कार आहे.
इतिहास अभ्यासकांचा ऐतिहासिक स्थळांचा पसंतीक्रम
नितीन अनवेकर (अध्यक्ष वारसा फाउंडेशन)
अक्कलकोट येथील आशिया खंडातील सर्वात मोठे शस्त्र संग्रहालय
सोलापूरचा भुईकोट किल्ला
हत्तरसंग कुडल मंदिर समूह
सिद्धेश्वर मंदिर
वेळापूरचा मंदिर समूह
डॉ. लता अकलूजकर (इतिहास अभ्यासक व लेखिका)
हत्तरसंग कुडल मंदिर
सिद्धरामेश्वर जन्मस्थान सोन्नलगी
सोलापूरचा भुईकोट किल्ला व मल्लिकार्जुन मंदिर
अकलूजचा किल्ला
कोरवलीचे महादेव मंदिर
प्रो. डॉ. प्रभाकर कोळेकर (संचालक, कौशल्य विकास केंद्र,पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ)
हत्तरसंग कुडल मंदिर
विठ्ठल मंदिर पंढरपूर
नारायण चिंचोली येथील सूर्य मंदिर
कोरवली येथील महादेव मंदिर भुईकोट किल्ल्यातील व बाहेरील मल्लिकार्जुन मंदिर
सीमंतिनी चाफळकर (वास्तू तज्ञ व अभ्यासक)
हत्तरसंग कुडल मंदिर
सोलापूरचा भुईकोट किल्ला
वेळापूर अर्धनारी नटेश्वर मंदिर समूह
पंढरपूर मंदिरे-वाडे व घाट
माचणूरचे सिद्धेश्वर मंदिर, घाट व जटाशंकर मंदिर
प्रा. डॉ. चंद्रकांत चव्हाण (इतिहास अभ्यासक)
हत्तरसंग कुडल मंदिर
करमाळ्याचे कमलादेवी मंदिर
वेळापूरचे अर्धनारी नटेश्वर मंदिर
बार्शीचे भगवंत मंदिर
सोलापुरातील इंद्रभुवन इमारत.
अयोध्येतील श्री रामांचं मंदिर नागर शैलीत का बांधलं आहे? काय आहे नागर शैली?
Ram Navami 2024 :
अखेर रामलल्ला मंदिरात विराजमान झाले आहेत. सर्वच स्तरावर राम मंदिर अतिशय भव्य असावे यासाठी सर्व प्रयत्न करण्यात आले. पण या सर्व गोष्टींमध्ये एक गोष्ट जाणून घेण्यासारखी आहे ती म्हणजे हे मंदिर नगर स्थापत्यशैलीत बांधलेले आहे. राम मंदिरासाठी नागरा शैली वापरण्यात आली आहे. कारण ती उत्तर भारतात आणि नद्यांना लागून असलेल्या भागात प्रचलित आहे. या वास्तूकलेची काही खास वैशिष्टय आहे.
मंदिर उभारण्याच्या प्रसिद्ध शैली कोणत्या?
नगर, द्रविड आणि वेसर या मंदिर बांधणीच्या तीन शैली देशात प्रमुख होत्या. पाचव्या शतकातील उत्तर भारतातील मंदिरांवर हा प्रयोग सुरू झाला. मध्यंतरी दक्षिणेत द्रविड शैली विकसित झाली होती. नगर शैलीत मंदिर बांधताना काही खास गोष्टींची काळजी घेतली जाते.
गर्भगृह हे सर्वात पवित्र स्थान आहे
गाभाऱ्यातच रामलल्लाच्या प्राणप्रतिष्ठा करण्यात येत आहेत. याच्या वर एक शिखर आहे. दोन्ही ठिकाणे अत्यंत पवित्र आणि मुख्य मानली जातात. गाभाऱ्याभोवती प्रदक्षिणा मार्ग आहे. यासोबतच आणखीही अनेक मंडप आहेत. त्यावर देवी-देवतांचे किंवा त्यांच्या वाहनांचे, फुलांचे कोरीव काम केलेले आहे. यासोबतच मंदिराचा कलश आणि ध्वजही आहे.
या शैलीचा प्रसार हिमालयापासून विंध्य पर्वतरांगांपर्यंत दिसून येतो. वास्तुशास्त्रानुसार, नागर शैलीतील मंदिरांचे बांधकाम पायापासून ते काळसाच्या टोकापर्यंत चौकोनी असते. पूर्ण बांधकाम झालेल्या नागर मंदिरात गर्भगृह, त्याच्या समोर अनुक्रमे सभामंडप आणि अर्धमंडप आढळतात. एकाच अक्षावर एकमेकांना जोडलेले हे भाग बांधले जातात.
नागरा या शब्दाची उत्पत्ती नगर या शब्दातून झाली आहे. शहरात सर्वप्रथम मंदिर बांधण्यात आल्याने त्यांना नगर असे नाव देण्यात आले. शिल्पशास्त्रानुसार नागर शैलीतील मंदिरांचे आठ मुख्य भाग आहेत
पाया ज्यावर संपूर्ण इमारत बांधली गेली आहे.
मसुरक - पाया आणि भिंती यांच्यामधला भाग
जंघा - भिंती (विशेषतः गर्भगृहाच्या भिंती)
कपोट – कॉर्निस
शिखर - मंदिराचा वरचा भाग किंवा गर्भगृहाचा वरचा भाग
ग्रीवा - शिखराचा वरचा भाग
गोलाकार अमलाका - स्पायरच्या वरच्या बाजूला फुलदाणीचा खालचा भाग
कळस - शिखराचा वरचा भाग

नागरा शैलीची परंपरा उत्तर भारतातील नर्मदा नदीच्या उत्तरेकडील प्रदेशापर्यंत विस्तारलेली दिसून येते. नागर शैलीतील मंदिरांमध्ये आराखडा आणि उंचीचे ठराविक मापदंड ठरवण्यात आलेले आहेत. ही कला सातव्या शतकानंतर उत्तर भारतात विकसित झाली, म्हणजेच परमार शासकांनी या भागात नागरा शैलीची मंदिरे बांधली, स्थापत्यशास्त्राच्या क्षेत्रात नागरा शैलीला प्राधान्य दिले.
प्रभू श्रीरामाचे सिंहासन सोन्याने मढवलेले आहे. गर्भगृह आणि मजला पांढरा मकराना संगमरवरी आहे. मंदिराचे खांब बनवतानाही मकराना संगमरवरी वापरण्यात आला आहे. कर्नाटकातील चेरमोथी वाळूच्या दगडावर देवतांचे कोरीव काम केले आहे. याशिवाय राजस्थानच्या बन्सी पहारपूर येथील गुलाबी वाळूचा दगड प्रवेशद्वाराच्या भव्य आकारात वापरण्यात आला आहे.

2100 किलो वजनाची अष्टधातूची घंटा गुजरातने दिली आहे. पितळेची भांडी उत्तर प्रदेशातून आली आहेत. तर पॉलिश केलेले सागवान लाकूड महाराष्ट्रातून आले आहे. मंदिराच्या बांधकामासाठी वापरण्यात आलेल्या विटा सुमारे 5 लाख गावांमधून आल्या होत्या.
या शैलीची मंदिरे प्रामुख्याने मध्य भारतात आढळतात
कंदरिया महादेव मंदिर ( खजुराहो )
लिंगराज मंदिर - भुवनेश्वर (ओरिसा)
जगन्नाथ मंदिर - पुरी (ओरिसा)
कोणार्क सूर्य मंदिर - कोणार्क (ओरिसा)
मुक्तेश्वर मंदिर - (ओरिसा)
खजुराहो मंदिरे - मध्य प्रदेश
दिलवाडा मंदिरे - माउंट अबू (राजस्थान)
सोमनाथ मंदिर - सोमनाथ (गुजरात)

कोणार्क सूर्य मंदिरesakal
खाडीत लालभडक उगवता सूर्य, मगरीने भरलेले जगबुडीचे खोरे अन् बरंच काही; मालदोलीत असं नेमकं आहे तरी काय?
चिवेली आणि जगबुडीचे खोरे हे साधारण शंभर-सव्वाशे वर्षांच्या मगरीने भरलेले खोरे आहे.
-पराग वडके, चिपळूण parag.vadake@gmail.com
खाडीत मस्त पहाटेचा लालभडक उगवता सूर्य..... साधारण शंभर-सव्वाशे वर्षे मगरीने भरलेले चिवेली आणि जगबुडीचे खोरे (Jagbudi Valley). पंधरा-पंधरा फुटी मगरी शेकड्याने खाडीकिनारी पहुडलेल्या. शंभर वर्षांपूर्वी कोकणात आंबा, काजू, फणस यांचे भरघोस उत्पन्न का यायचे? याचे सोपं उत्तर मिळेल, असा वाड्याचा परिसर. हे सर्व पाहायचं असेल तर सरळ मालदोली गाव गाठावं लागेल...!
खाडीच्या मध्यात उगवणारा सूर्य पाहायचा असेल तर सरळ मालदोली गाव (Maldoli Chiplun) गाठावं. मालदोलीमध्ये जाताना चिपळूण-गुहागर रस्ता आणि मध्ये मुंढे फाटा लागतो. तेथून भिले, केतकी, करंबवणे गाव करत जाता येते; पण माझ्या आवडीचा रस्ता म्हणजे चिपळूण बाजारपेठ ते गोवळकोट किल्ला (Gowalkot Fort) रस्ता. पुढे कालुस्ते गावाला प्रदक्षिणा घालत भिलेफाटा. तिकडून केतकी, करंबवणे करत मालदोली. हाच मार्ग का? तर दाभोळच्या बंदरात आत घुसलेली खाडी साधारण १५० किमी वळणे घेते. शेवटचे टोक म्हणजे गोवळकोट. हा १५० किमीच्या खाडीपट्ट्यात कोकणातील सागरी निसर्गजीवन अवलंबून असते.
लोटे एमआयडीसी टाकाऊ रसायने टाकते त्यामुळे हे जीवन सध्या शेवटचे घटका मोजत आहे. सतत आंदोलने आणि उपाय असा प्रकार चालू असतो तर मालदोलीला जाताना वाटेत गोवळकोट (गोविंदगड) नावाचा किल्ला लागतो. या किल्ल्याला छत्रपती शिवरायांनी भेट दिल्याचा संदर्भ आहे. किल्ला साधारण चार ते पाच एकरवर वसलेला. चहुबाजूंनी चिपळूणचे विहंगम दृश दिसते आणि संपूर्ण गोवळकोट खाडी. एकदा सहज साडेसहा वाजता या किल्ल्यावर गेलो असता साधारण दीडशे ते दोनशे धनेश पक्षी बसलेले दिसले. एवढे एकत्र धनेश पक्षी प्रथमच पाहायला मिळाले. नंतर माहिती काढली असता साधारण आठ दिवसाकरिता हे पक्षी या गडावर येतात आणि नंतर पुढे जातात, असे पक्षी निरीक्षण आहे; पण तुफान मजा आली होती.
गोविंदगड, शिवकालीन बुरूज, चुनाभट्टी, पाण्याचे टाके आणि तोफा असे अवशेष दाखवत आजही उभा आहे. तेथून तुम्ही कालुस्ते गावाला वळसा घालायचा. हा वळसा म्हणजे एक सुंदर कविता आहे. एका बाजूला मोठमोठे बंगले आणि एका बाजूला जपलेले गावपण याची सांगड आणि सोबत अतिशय दुर्मिळ असणाऱ्या खाड्यांपैकी एक खाडी गोवळकोट. तेथून अतिशय वाकडे असे कोकणी टर्न मारले की, आपण लागतो भिले रोडला आणि तेथून भिलेफाटा.
या भिलेफाट्यावर वृद्ध आजी-आजोबांचे एक दुकान आहे. तेथील कांदापोहे, बटाटावडा आणि उसळपाव एकदम चविष्ट असतात. कुठेही नाश्ता न करता पहिला मुक्काम येथे आणि मग भिले, केतकी आणि करंबवणे करत आपण मालदोली गावात पोहचतो. तेथे शैलेंद्र संसारे याचे एक छोटेखानी घरगुती रिसॉर्ट आहे. खाडीला लागूनच असल्याने पाय पसरत मस्त जेवणाची ऑर्डर द्यायची. शैलेंद्र तुम्हाला या खाडीचे वैशिष्ट्य असलेले अनव नावाचा करंगळीएवढा मासा त्याचे तिखट आणि गरम मऊ भाकरी खायला घालतो. मग निघायचे मालदोली पाहायला. मालदोलीमध्ये काय पाहायचे तर येथे खाडीत मस्त पहाटेचा लालभडक उगवता सूर्य पाहता येतो, फोटोग्राफर खुश होतात. तेथून शेकड्यात मगरी पाहायला जाता येते.
चिवेली आणि जगबुडीचे खोरे हे साधारण शंभर-सव्वाशे वर्षांच्या मगरीने भरलेले खोरे आहे. पंधरा-पंधरा फुटी मगरी शेकड्याने सहजपणे खाडीकिनारी पहुडलेल्या असतात. हे मगरदर्शन झाले की, ट्रेझरहंट करायला दिवा बेटाकडे जायचे. स्थानिक वाटाड्या झाडे तोडत तुम्हाला या बेटावर नेतो आणि साधारण दोन-तीन हजार वर्षापूर्वीचे पुरावे सापडू लागतात. भांडी, नाणी वगैरे वगैरे. हे करून दमला असाल तर पुन्हा मालदोली यायचे आणि ताम्बोशी नावाचा मासा खायचा अतिशय चविष्ट.
आता एवढं सर्व झाल्यावर डोक अजून शार्प बनवायला निघायचे मराठेवाड्याकडे. शंभर वर्षांपूर्वी कोकणात आंबा, काजू, फणस यांचे भरघोस उत्पन्न का यायचे? याचे सोपं उत्तर जाणून घ्यायला हा वाडा आवश्यक पाहायला हवा. मालदोली गावातच (कै.) रामचंद्र वासुदेव मराठे यांची हेरिटेज ठरेल, असे वास्तू आहे. हा वाडा एकूण साडेसात एकर परिसरात दोन हजार चौ. फूट बांधकामात पसरलेला आहे. वाड्याचे आरेखन , भारतरत्न अभियंता डॉ. विश्वेशरय्या यांच्या मार्गदर्शनाखाली झालेले आहे. सिव्हिल इंजिनिअरिंगचे शिक्षण घेणाऱ्यांना ही वास्तू पाहण्यासारखी आहे. सर्वात महत्वाचे वैशिष्ट्य इथे जी आंब्याची बाग आहे तिथे दर चार-पाच झाडामागे सोनचाफा, बकूळ, खुरीची सुंगधित फुले देणारी झाडे लावण्यात आलेली आहेत जेणेकरून नैसर्गिकरित्या मधमाशा तिथेच फिरत राहाव्यात व परागीभवन होऊन उत्पन्न वाढावे.
सध्या आंब्याच्या बागा कमी उत्पन्नाने ग्रस्त आहेत. त्या आंबा बागायतदारांनी हा उपाय जरूर करावा. सर्वात महत्वाचे, हा वाडा वास्तूशास्त्राचा अप्रतिम नमुना आहे. अतिशय उजेड येणारी रचना, वाड्याचे दोन समान उभे भाग, संपूर्ण लाकडी काम, शंभर वर्षापूर्वीचे ड्रेनेजने गंजलेले ड्रेनेज पाईप आणि वाड्याच्या कोणत्याची मजल्यावर उभे राहिले की, दिसणारी सात एकराची आंब्याची बाग अशी रचना. जरूर हा वाडा पाहा. अर्थात, सध्या तेथे मराठे यांच्या वंशजांनी हा वाडा विश्व हिंदू परिषदेला दान केला आहे. तेथे एक वृद्धाश्रम चालवले जाते. तोही पाहता येतो. दुर्मिळ खाडी, दुर्मिळ मासे, आशियातील सर्वात मोठे नैसर्गिक मगरीचे अधिवास, विविध पक्षी आणि हेरिटेज वाडा अशी डिश भन्नाट आंब्याचा मोहराच्या वासासकट हे मालदोली गाव सर्व्ह करते. हे ठिकाण नक्कीच पाहावे असेच आहे!
(लेखक दऱ्याखोऱ्यांतून भटकंती करणारा सामाजिक कार्यकर्ता आहे.)
पावसाळ्यात 'तिवडी गाव' नव्या नवरीसारखं सजतं; काय आहे गावाची खासियत?
फार पुरातन गाव, गावातील घरटी एक तरी व्यक्ती भारतीय सैन्यदलात (Indian Army) असलेला किंवा निवृत्त असा आहे.
-पराग वडके, चिपळूण parag.vadake@gmail.com
सह्याद्री आपल्याला त्याच्या कडांवरून अलगद उंच उंच झोके देत वर वर नेत असतो. अचानक एका वळणावर गार गार वारा येऊ लागतो, हीच ती खूण. आपण सह्याद्रीच्या गाभाऱ्यात प्रवेश केला आहे, असे समजण्याची. नंतर एका बाजूला खोल दरी आणि पिटुकली गावे तर एका बाजूला उंच शिखरे. असे करत आपण गावाच्या चिंचोळ्या गेटमधून प्रवेश करतो...!
मन चिंब पावसाळी झाडात रंग ओले
घनगर्द सावल्यांनी आकाश वाकलेले
पाऊस पाखरांच्या पंखात थेंबथेंबी
शिडकाव संथ येता झाडे निळी कुसुंबी
घरट्यात पंख मिटले झाडात गर्द वारा
गात्रात कापणारा ओला फिका पिसारा
या सावनी हवेला कवळून घट्ट घ्यावे
आकाश पांघरोनी मन दूरदूर जावे
रानात एककल्ली सुनसान सांजवेळी
डोळ्यांत गलबताच्या मनमोर रम्य गावी
केसात मोकळ्या या वेटाळूनी फुलांना
राजा पुन्हा नव्याने उमलून आज यावे
मन चिंब पावसाळी मेंदीत माखलेले
त्या राजवंशी कोण्या डोळ्यात गुंतलेले
ना. धो. महानोर यांची ही कविता जगायची असेल तर कार, बाईक, सायकल काय मिळेल ते वाहन घ्यावे आणि चिपळूण तालुक्यातील दसपटी भागातील तिवडी गावाला भेट द्यावी. तुम्हाला कधी वाटले सालं आयुष्य खूपच रूटिन झाले आहे, मरगळ आली आहे आणि काही सुचत नाहीये तर हे गाव तुम्हाला जवळ करते, कुशीत घेते, गोंजारते आणि पुन्हा नव्याने उभारी देते नव्याने झेप घेण्याकरिता.
या गावाशी माझा संबंध आला तो आमच्या वृद्ध निराधार लोकांसाठी काम करणाऱ्या सांजसोबत संस्थेमुळे. या गावात साधारण सात वृद्ध होते, जे निराधार होते. त्यांना दरमहा संपूर्ण किराणा द्यायचा होता; पण गाव आहे चिपळूणपासून ३५ किमी अंतरावर. अतिशय दुर्गम अशा सह्याद्रीच्या कड्यावर. कोणी कार्यकर्ता मिळत नव्हता म्हणून मी हे गाव स्वतःकडे घेतले. आज सात वर्ष झाली. दरमहा एकदा या गावात जाणे होते. पहिल्या दिवशी जो उत्साह होता तोच आजही उत्साह आहे. माझ्यामुळे या गावाचे अनेकजण चाहते बनले. कधी जायचे असले की, नंबर असतात गाडीत बसायला.
आपण चिपळूण (Chiplun) सोडले की, कराड दिशेने गाणे खडपोली औद्योगिक वसाहतीकडे जायचे आणि सरळ ३५ किमी उंच उंच चढत जायचे. सह्याद्री आपल्याला त्याच्या कड्यांवरून अलगद उंच उंच झोके देत वर वर नेत असतो. अचानक एका वळणावर गार गार वारा येऊ लागतो, हीच ती खूण. आपण सह्याद्रीच्या गाभाऱ्यात प्रवेश केला आहे असे समजावे. नंतर एका बाजूला खोल दरी आणि पिटुकली गावे तर एका बाजूला उंच शिखरे. असे करत आपण गावाच्या चिंचोळ्या गेटमधून प्रवेश करतो.
हा प्रवास आणि गावाचे गेट तेथून दिसणारा अतिशय कोरीव काम केलेला सह्याद्री आणि आपण त्याच्या गर्भगृहात नतमस्तक झालेलो. सोबत वारा एवढा जोरात असतो की, तुम्ही ढकलले जाता. संपूर्ण सह्याद्री पट्ट्यातील सर्वात शुद्ध हवेचे गाव. कडांना धरून प्रवेश केला की, आत वाड्या आहेत. गावाला सर्व बाजूंनी जंगलाने व्यापलेले आहे; पण आपण अत्यंत टोकावर असल्याने सह्याद्रीच्या तासलेल्या कडा अगदी हाताला येईल, अशा दिसतात. सर्वात इथले प्रचंड आकर्षण काय असेल तर जगातील सर्व फोटोग्राफरना आकर्षित करेल, असा सूर्योदय. वातावरणात धूलीकण नाहीत आणि कडा दिसत असतात.
पहाटे साडेपाचला हजर राहायचे. एकावेळी दोन-तीन कॅमेरे लावून ठेवायचे का तर एका मर्यादेत टाईमपास मोड लावायचा म्हणजे सूर्योदय होण्यापूर्वीचे रंग ते सूर्योदय पाहायला मिळतो. दुसरा कॅमेरा सभोवताली सह्याद्रीच्या सर्व कडा वेगवेगळ्या रंग फेकत असतात आणि पहिली सूर्यकिरणे सह्याद्रीवर पडताना विविध रंगांचे संमेलन भरलेले असते. या गावात कितीतरी वेळा नुसता सूर्योदय टिपायला रोज सकाळी साडेपाचला उठून मी ३५ किमी प्रवास करून एकटाच सह्याद्रीच्या कडांवर बसलेला आहे. संध्याकाळ तर बेफाट असते. प्रचंड ढग, चर्चगेटवरून बोरिवलीला जावे प्रचंड गर्दीने तसे धावत सुटलेले असतात. हे गाव ढगांच्या रेषेत समांतर येते. मी माझे काम आटपून सहज रस्त्याला उभा होतो.
समोर प्रचंड खोल दरी आणि समोर सर्व डोंगररांगा. कुठूनतरी एक प्रचंड मोठा ढग आला. जणू काही तू आमच्या गेटमध्ये का घुसलास, असे कोकणी भांडण करायला. तो माझ्या समांतर होता. साधारण अर्धा किमी हवाई अंतर असेल. ढग आला, स्थिरावला आणि मस्त आपली पोटलीची गाठ सोडली आणि साठवलेला पावूस धो धो पाडू लागला. मी अक्षरशः ढगातील धबधबा पाहत होतो. एकदा रात्री कोजागिरीला दहा वाजण्याच्या दरम्यान या गावात गेलो होतो. उंचीवरचे कडे आणि रस्ता सुरू झाला तर कारच्या पुढ्यात निळा जांभळा लाईट लागलेला रस्त्यात दिसला. पुढे पुढे निघालो तर अखंड लायटिंग. नंतर कोणीतरी माहिती दिली हा नाईटजार पक्षी लोकल भाषेत, जारवा पक्षी जिथे प्रदूषण कमी असते तिथे दिसतो; पण एवढ्या मोठ्या संख्येने तो तिवडीमध्येच दिसतो.
हा पक्षी रात्री उडताना डोळे मिचकावतो त्या वेळी त्याचे डोळे निळे, जांभळे दिसतात आणि ग्रामीण भागात बऱ्याचवेळा भूत दिसले भूत दिसले, अशी आवई उठते. तिवडी गाव (Tiwadi Village) पावसाळ्यात नव्या नवरीसारखे सजते. प्रचंड पाऊस आणि हिरवा रंग यात रंगलेले गाव. पावसात थेट सह्याद्री इथे प्रत्येक ढग अडवतो. शस्त्रक्रिया करतो, पाऊस काढून घेतो आणि ढगांना पुढे पाठवतो. त्यामुळे तुफान पाऊस पाहायचा असेल तर हे गाव गाठायचे. फक्त पावसात या गावात बऱ्याचवेळा दरडी कोसळतात. पाऊस संपला की, हे गाव कासपठार बनते. असंख्य फुललेली रानफुले, झुळझुळवाला आणि एकालयीत लाटा आदळणारा गवताचा समुद्र. कितीतरी चित्रपट शूट होतील, अशी प्रत्येक वळणावरची लोकेशन या गावाला लाभलेली आहेत.
गावाचे सरपंच रमेश पवार गावासाठी धडपडत असतात. विविध योजना मिळवून देणे वगैरे काम करतात. गावात वृद्ध एकाकी राहतात आणि काही गावकरी. या गावातील देवी पद्मावतीचा शिमगा हा सण प्रसिद्ध आहे. तसे गाव आहे छोटेखानी. फार पुरातन गाव, गावातील घरटी एक तरी व्यक्ती भारतीय सैन्यदलात (Indian Army) असलेला किंवा निवृत्त असा आहे. अर्थात, सध्या गावात रोजगार नसल्याने बहुतांश गावातील तरुण हे नोकरीसाठी मुंबई-पुणे-चिपळूण या भागात पसरलेले. गावच्या आजूबाजूला जंगलतोडीचा शाप आहेच, जसा तो कोकणात प्रत्येक गावाला आहे. इथून पुढे जंगलात शिरायचे असेल तर वनविभागाची परवानगी लागते. तासलेला सह्याद्री, नेत्रसुखद निसर्ग, तुफान पाऊस, बेभान वारा अंगावर घ्यायचा असेल तर एकदा या गावाला भेट द्या.
(लेखक दऱ्याखोऱ्यांतून भटकंती करणारा सामाजिक कार्यकर्ता आहे.)
काहीतरीच काय! इथं होळीदिवशी पुरूषांकडून मार खाण्यासाठी महिला असतात उत्सुक, कारण...
Holi 2024 :
होळीनंतर ऋतूबदल होतो थंडीचा सिझन जातो आणि कडक उन्हाळ्याला सुरूवात होते. देशात होळी सणाच्या प्रथा आणि परंपरा वेगवेगळ्या आहेत. ती वेगवेगळ्या पद्धतीने साजरी केली जाते. आज आम्ही तुम्हाला अशी एक परंपरा सांगणार आहोत जी ऐकून तुम्ही म्हणाल की छे, काहीतरीच काय!
आपल्या देशात अशी एक अशी पद्धत आहे. जिथे लाडू फेकून मारण्याची परंपरा आहे. इथे पुरूष महिलांवर लाडू फेकून मारतात. या रंग नसलेल्या होळीची अनेक लोक वाट पाहत असतात. कारण, इतरांपेक्षा वेगळी असलेल्या या होळीला एक पौराणिक महत्त्व आहे. (Holi Celebration 2024)
मध्य प्रदेशातील बुधवारा येथील श्री गोकुळ चंद्र मंदिरात लाडू होळी खेळली जाते. या होळीला ३५ वर्षांची परंपरा आहे. भगवान श्री कृष्ण गोपिकांसोबत मातीचे खडे, छोटी दगडे फेकून त्यांचे माठ फोडायचे, गोपिकांसोबत होळी खेळायचे. याच धर्तीवर बुरहानपूरातील महिलांसोबत पुरूष लाडू मारून होळीचा आनंद लुटतात. (Holi 2024)
मंदिरात होळी दिवशी सायंकाळी २ तास हा कार्यक्रम पार पडतो. होळीला पुरूष राजिगऱ्याचे लाडू घेऊन मंदिरात येतात. अन् श्री कृष्णांना नैवेद्य दाखवतात. त्यानंतर तेच लाडू महिलांवर फेकून मारले जातात. आणि महिलाही हे लाडू म्हणजे श्री कृष्णांचा प्रसाद आहे असे मानून तो घरी घेऊन जातात.
भगवान श्री कृष्ण जेव्हा गोपिकांची छेड काढायचे तेव्हा गोपिका त्यांना ओरडायच्या. प्रसंगी त्यांच्या मागे काठी घेऊन पळत होत्या. त्या पद्धतीनेही वाराणसीमध्ये लठमार होळी साजरी केली जाते.
जगातलं एकमेव जंगल जिथं आहे फक्त आणि फक्त ‘महिला राज’; पुरूष गेले तर होतात असे हाल!
World Forest Day 2024 :
आज आंतरराष्ट्रीय वन दिन आहे. हा दिवस दरवर्षी २१ मार्च रोजी साजरा केला जातो. जंगल आणि त्यांचे महत्त्व याबद्दल जागरूकता वाढवणे हा त्याचा उद्देश आहे. या दिवशी, संयुक्त राष्ट्र संघ आणि अन्न आणि कृषी संघटना (FAO) अनेक कार्यक्रम आयोजित करतात.
पहिला जागतिक वन दिन २१ मार्च २०१३ मध्ये साजरा करण्यात आला. संयुक्त राष्ट्रांच्या आमसभेने ही घोषणा केली. तेव्हापासून तो दरवर्षी २१ मार्च रोजी साजरा केला जातो. या वन दिनानिमित्तानेच आज आपण एका अशा जंगलाबद्दल जाणून घेणार आहोत जिथे पुरूषांना बंदी आहे अन् तिथे केवळ महिला राज चालतो.
तुम्हाला वाचून आश्चर्य वाटेल पण जगात अशीही जागा आहे जिथे एकही पुरूष नाही. आजकाल फॅड आलंय की तरूण आपल्या गाडीवर लोगो काढून घेतात ‘Girls Not Allowed’ अगदी तसंच या जंगलात पुरूषांना प्रवेश करण्यात सक्त मनाई आहे. ही जागा कोणती अन् कोण आहेत त्या महिला ज्या अज्ञातवासात राहत आहेत, त्यांच्याबद्दल जाणून घेऊयात.(World Forest Day 2024 )
आम्ही ज्या ठिकाणाबद्दल बोलत आहोत ते इंडोनेशिया देशात असून त्या जागेला पापुआ म्हणून ओळखलं जातं. तशी सगळीच वने पवित्र आहेत. पण हे जंगल जरा खास आहे. कारण या जंगलाला पवित्र जंगल म्हणूनही ओळखले जाते.
विशेष म्हणजे जगात वावरताना सतत अत्याचार,बलात्कार याची काळजी करणाऱ्या स्त्रिया इथं मोकळ्या असतात. कारण, इथं कुठल्याही पुरूषाला प्रवेश नाही. आणि जंगल आहे कुठूनही शिरता येतं असा विचार करून कोणी पुरूष गेलाच तर त्याला त्यांच्या जमातीतील पंचांसमोर उभ करून शिक्षा सुनावली जाते.
आपल्या शब्दांत सांगायचे तर पैशात ती किंमत पाच हजार असते. अन् त्यांच्या भाषेत हा दंड विशिष्ट प्रकारच्या गुळगुळीत दगडांच्या रूपात असतो.
कसे आहे जंगलातील स्त्रियांचं राहणीमान
या जंगलातील स्त्रिया आदिवासी जमातीतील असून दक्षिण आफ्रिकेतील महिलांसारख्याच हातावर, शरीरावर गोंदवून घेतलेल्या असतात. त्या इथं नग्न वावरतात. तसेच, त्यांची आभुषणेही पक्षांची पिसे,शिंपले यांची असतात. तर त्या उदरनिर्ववाहासाठी विशिष्ट प्रकारच्या शिंपल्यांची विक्री करतात. तसेच, जंगलातील फळे,प्राणी खाऊन जगतात.
हे जंगल आमचं घर आहे जंगलंच उरलं नाहीतर आमच्या जगण्यालाही काही अर्थ नाही. आजकाल अनेक पर्यटक येतात अन् समुद्रात प्लास्टिकच्या बाटल्या, कचरा फेकून जातात. समुद्र ही घाण पोटात घेत नाही. तो पुन्हा बाहेर फेकतो. अन् याचा आमच्या आयुष्यावर थेट परिणाम होत आहे, असे या जंगलातील एका वृद्ध स्त्रीने सांगितले.
हे जंगल सुरक्षित आणि स्वच्छ ठेवणं आपली जबाबदारी आहे. पण लोक याकडे दुर्लक्ष करतात, असेही त्या म्हणाल्या.
जंगलातील पाण्यात सापडणाऱ्या विशेष शिंपले विकण्यासाठी या महिला बाजारात जातात. तिथे त्यांच्या वस्तू विकल्या गेल्या की तिथूनच लागेल त्या वस्तू आणून त्या उदरनिर्वाह करतात. पण आता जंगल स्वच्छ राहीले नसल्याने शिंपले शोधण्यात जास्त वेळ जातो, असे तिथल्या महिलांना वाटते.
कोकणातील स्वप्नवत गाव 'अणसुरे'; गावात काय आहे खास?
अणसुऱ्याच्या खाडीत मिळणारे छोटे-छोटे ताजे मासे तराफ्यावर मस्त तिखट फ्राय करून खाण्यास मिळतात.
-पराग वडके, चिपळूण parag.vadake@gmail.com
कोरोनाचा काळ सुरू होण्यापूर्वीचा सीझन. आंबे मित्रांनी मागवले होते. कुठून घ्यायचे विचार करत असतानाच राजापुरातील अणसुरे गाव आठवले. तिथले आंबेवाले सोमण बरेच दिवस पाठी होते. या घरी एकदा घर पाहायला. मुहूर्त काही मिळत नव्हता. मग, ५० बॉक्स आंबे कोणाकोणाचे अशी यादी झाली आणि स्टार्टर मारला तो थेट अणसुरे गावात (Ansure Village). कोकणचे स्वप्न म्हणूनच त्याला संबोधले पाहिजे.
अणसुरे हे गाव भारतातील पहिले गाव आहे की, ज्या गावाने स्वतःची वेबसाईट तयार केली आहे. अतिशय अनोखी माहिती या वेबसाईटवर आहे तर रत्नागिरी मार्गे आडिवरे करत अणसुरे गाठले. खरे सांगायचे तर हा समुद्र आणि आपण रत्नागिरीपासून (Ratnagiri) सोबत करत या गावात घुसतो. काही ठिकाणी एकेरी मार्ग, समुद्री पूल, दाट सुरूचे जंगल असे करत करत आपण निसर्गात खोलखोल अडकत जातो. हातातील मोबाईल बाजूला पडतात. हा फोटो काढू करत करत फोटोच फोटो काढत आपण पुढे पुढे जातो. निसर्गाने दिलेले एक पाचू रंगाचे गाव आणि त्याला लाल कातळाचे कोंदण असलेल्या गावात प्रवेश करतो.
मुक्काम सोमण यांच्याकडे होता, त्यामुळे हक्काचा यजमान, गाईड, निसर्गसेवक असे सर्वकाही जवळजवळ तेच. अणसुऱ्यातील घरे उंबरठा खाडीला लागून आणि पाठचे दार डोंगराला लागून अशा बऱ्याच वाड्यावाड्यांमधून पसरलेले. पाहू तिकडे आंबेच आंबे. चांगली चाळीस वर्षे राखलेली झाडे. उंची तर पार आडवी तिडवी. रत्नागिरीपासून साधारण ६० किलोमीटरवर अणसुरे गाव येते. गावात शिरतानाच प्रसिद्ध जैतापुराचा सडा (Jaitapur Sada) दिसतो आणि समुद्रही. त्यामध्ये साधारण एक-दोन किमीची खाडी आणि लगेच नाणार प्रकल्पाची जागा. निसर्ग एखाद्या गावाला किती भरभरून देतो त्याचे उत्तम उदाहरण म्हणजे अणसुरे गाव. पण, विकासाच्या पाठी धावताना हे प्रचंड नैसर्गिक सामुग्री असणारे भाग लुप्त होणार आहे.
कदाचित आपली पिढी शेवटची की जी हे पाहू शकली. सोमण यांच्या घरात प्रवेश करताच आधुनिक, फ्रेश मस्त कोकम सरबत, आंबा सरबत, तळलेले गरे आणि पोहे असा नाश्ता हजर. तो खातोय तोच सोमण आले अन् म्हणाले, चला वाडी बघायला. वाडीत गेलो तर जशाचा तसा ठेवलेला जुना वाडा, साधारण शंभर-दीडशे वर्षांपूर्वीचा. शूटिंगसाठी निर्माते वेडे होतील, असा वाडा. सर्वांत काय आवडले तर पायरहाट, बरोबर विहिरीच्या मध्यावर मोठे लाकडी सायकलसारखे चाक. चाकाचे एक टोक विहिरीतील पाणी काढण्याच्या भांड्याला दोरीने बांधलेले. आपण सायकल चालवतो तशी सायकल चालवायची की, मस्त कातळातील गोडे पाणी भराभर येऊ लागते. किती लाखो वर्षांपूर्वी हे शुद्ध पाणी तयार झाले असेल, असा प्रश्न पडतो तो आपल्याला निसर्ग मानवी उत्क्रांतीच्या चक्रातून पृष्ठभागावर आणून देतो.
आम्ही त्याच निसर्गाला पेट्रोरिफायनरी नावाचे विष बहाल करायला चाललो आहोत. सगळ्यात अणसुऱ्यात मजा म्हणजे इथे कोळी लोक छोटी तराफ्यासारखी होडी घेऊन जातात. त्यांना पैसे देऊन मस्त फिल्डिंग लावली की झालं. अणसुऱ्याच्या खाडीत मिळणारे छोटे-छोटे ताजे मासे तराफ्यावर मस्त तिखट फ्राय करून खाण्यास मिळतात. तेव्हा निसर्गाच्या अवीट चवीची अनुभूती घेतल्याचा आनंद मिळतो. अर्थात, पुढे मोठे प्रोजेक्ट आले तर हे खाडीचे वैभव नष्ट होणार हे नक्की. अणसुरे गावातून विजयदुर्ग किल्ला पाहता येतो. समुद्रात अदृश्य स्वरूपात उभी केलेली मानवी तटबंदी म्हणजे काय, त्याचे उदाहरण म्हणजे विजयदुर्ग हा अभेद्य किल्ला. हा किल्ला गाईड घेतल्याशिवाय पाहू नये. अणसुरे गावाची अर्थव्यवस्था ही पूर्णपणे बागायती, मासेमारी आणि पर्यटन यावर उभी आहे. शासनाचे पर्यटन धोरण या गावात फारसे झिरपलेले नाही. त्यामुळे नकळत गावाची ठेवण आहे तशीच राहिली आहे ते पण चांगले म्हणा.
सर्वांत महत्त्वाचे म्हणजे या गावाचा हापूस आंबा, रंग, चव यात किंग आहे. तुम्ही कोणताही हापूस खा आणि या पट्ट्यातील हापूस खा, तुम्हाला फरक जाणवेलच; पण दुर्दैवाने उद्या रिफायनरी आली तर प्रचंड घडामोडी या भागात होणार आहेत आणि अर्थात, परिणामदेखील होतील. या गावातून जाता जाता एक शाळा पाहिली. अतिशय मजबूत अशी ११० वर्षे झालेली शाळा; पण विद्यार्थी नाहीत या कारणाने शाळा गेली पाच वर्षे बंद आहे. पण, शाळा अगदी खाडीकिनारी. स्वातंत्र्य संग्रामात कितीतरी येथील विद्यार्थी खाडीतील पाण्याशी खेळत स्वातंत्र्याच्या गुजगोष्टी करत मोठे झाले असतील. कदाचित स्वातंत्र्यसमरातही सहभागी पण झाले असतील.
आज तीच शाळा तिची वीटही ढळलेली नाही. केवळ मुले नाहीत म्हणून बंद पाहून खूप वाईट वाटले. अणसुरे गावाचे अजून एक वैशिष्ट्य म्हणजे एका ठिकाणी तीन-चार एकरांत डोंगर उतारावर कुसुंब वृक्षाची देवराई आहे. पक्षी निरीक्षकांसाठी ही देवराई म्हणजे आमंत्रण. कारण असंख्य पक्षी येथे पाहायला मिळतात. अत्यंत बहुपयोगी असा हा वृक्ष आहे. ही वनराई जरूर पाहा कधीतरी. अणसुरे कोकणचे प्रतिनिधित्व हे गाव करते. असंख्य प्राचीन परंपरा, निसर्गाने निसर्गासाठी जपलेली संपत्ती म्हणजे हे गाव. कधी सवड काढून जरूर पहा.
(लेखक दऱ्याखोऱ्यांतून भटकंती करणारा सामाजिक कार्यकर्ता आहे.)
कोल्हापूर,नागपूर अन् जयपूर.. शहरांच्या नावातील हे ‘पूर’ नक्की काय आहे?
लहानपणी उन्हाळ्याच्या सुट्टीत गल्लीतले सगळे मिळून गावाच्या नावांच्या भेंड्या खेळायचो. त्यातही सगळ्यात जास्त शब्द हे ‘र’ वरून यायचे. कारण, शहरांची नावाच्या शेवटी पूर असायचं. भारतातील सर्वात जास्त गावं याच शब्दाने संपतात.
गावाची, शहरांची नावे तिथल्या प्रसिद्ध गोष्टींवरून ठेवली जातात. तसं पाहिलं तर, प्रत्येक शहराला विशिष्ट इतिहास आहे. कोल्हापूरात कोल्हासूर राक्षसाचा वध झाला म्हणून कोल्हापूर म्हणतात. तर, सोलापूर हे शहर सोळा गावांच्या एकत्रिकरणाने बनले आहे. त्यामुळे त्याला सोलापूर म्हणतात. पण या शहरांमध्ये पूर शब्द कॉमन आहे.
पूर हा शब्द कुठून आला. प्रत्येक नावामागे तो का लावला गेला याला एक इतिहास आहे. त्या शब्दाचा अर्थ काय याची माहिती घेऊयात.
चला लवकर, कोल्हापूर-सोलापूर गाडी भरली.. कोण हाय का अजून तिकीट घ्यायचं, असा आवाज दिवसभर बसमध्ये ऐकू येतो. तर उत्तर भारतातील अनेक शहरांची नावेही पूरनेच संपतात. जयपूर,उदयपूर, सुलतानपूर अशी नावे प्रसिद्ध आहेत.
असा हा पूर शब्द मुळचा मराठी नाहीच. तो संस्कृत शब्द आहे. संस्कृतमध्ये ‘पूर’ चा अर्थ शहर किंवा किल्ला असा होतो. त्यामुळे राजा जेव्हा आपल्या राज्याचे किंवा साम्राज्याचे नाव घेतो तेव्हा त्याच्या नावाच्या शेवटी पूर हा शब्द जोडत असे. जसे राजस्थानची सध्याची राजधानी जयपूरच्या बाबतीत घडले.
शहरांच्या नावांमध्ये पूर हा शब्द जोडणे ही काही नवीन सवय नाही, तर ती शतकानुशतके जुनी परंपरा आहे. याचा पुरावा आपल्याला महाभारत काळातही सापडतो, जिथे हस्तिनापूर हे एक मोठे साम्राज्य होते. नंतर शहरांच्या किंवा राज्यांच्या नावांना पूर हा शब्द जोडण्याची परंपरा चालू राहिली.
आज या परंपरेचा परिणाम म्हणजे भारतातील जवळपास निम्म्या शहरांच्या नावांमध्ये पूर हा शब्द जोडला गेला आहे. काही लोकांचा असा विश्वास आहे की पूर हा शब्द अरबी भाषेतही आहे, जो अरबस्तानातून येणाऱ्या प्रवाशांसह भारतात पोहोचला.
३०० ते ५०० वर्षांपासून देशातल्या या गावांनी होळी साजरी केलीच नाही, कारण...
Holi Celebratrion 2024 :
तुम्हाला शोले चित्रपट आठवतोय का?. शोलेमध्ये होळी सणावेळी डाकू गब्बर सिंग सांबाला विचारतो की, होली कब है! त्यानंतर थेट होळीचा सणाचा जल्लोष दाखवला जातो. पण हे सुख प्रत्येकाच्या नशिबात नाही. कारण, भारतात अशीही काही गावं आहेत जे होळी साजरी करत नाहीत.
तुम्हाला वाटेल की होळीला दुसरं काहीतरी नाव असेल. किंवा होळी दुसऱ्या एखाद्या दिवशी साजरी करत असतील. तर असं नाहीय. भारतातील काही गावांनी होळीवर बहिष्कार टाकला आहे. होळी साजरी न करण्यामागेही अनेक कारणे आहेत. ती कारणं अन् गावं कोणती याची आज आपण माहिती घेऊयात.
होळी दिवशी एकमेकांना पडकून, मागे लागून होळीचे रंग लावले जातात. लहान मुलं, अबालवृद्ध सगळेच पाण्यात चिंब होतात. रंगांची उधळण करतात. काही लोक रंगांपासून दूर राहतात. पण काही गावातील लोकांना ना रंगांची ऍलर्जी आहे ना रंग खेळण्यासाठी पाण्याची कमी पण तरीदेखील हे लोक होळी साजरी करत नाहीत. यातील पहिलं गाव आहे हरियाणा राज्यातील दुसेरपूर हे.
हरियाणातील दुरेसपूर
या गावाने ३०० हून अधिक वर्षांपासून होळी साजरी केली नाही. ज्या दिवशी संपूर्ण देश रंगात न्हावून निघतो तेव्हा दुसेरपूर गाव कोरडं असतं. कारण एका सन्याशाने या गावाला शाप दिला होता.
त्याचं असं झालं होतं की, ३०० वर्षांपूर्वी गावातील काही लोकांनी होळीच्या मुहूर्ताआधीच होळी पेटवली होती. त्यामुळे गावातील एका सन्याशाने असे करू नका, होळीला मुहूर्त वेळ पाळणं गरजेचं असतं असे सांगत होता. पण गावकऱ्यांनी त्याच काही ऐकलं नाही. तसेच त्या सन्याशाची चेष्टाही केली. तेव्हा या साधूने पेटत्या होळीत उडी घेतली आणि गावकऱ्यांना शाप दिला.
तेव्हा घाबरलेल्या गावकऱ्यांनी साधूंची माफी मागितली. तेव्हा या गावात जेव्हा कधी होळी दिवशी एखाद्या गायीला वासरू आणि महिलेला बाळ होईल त्या दिवशी गावाची या शापातून मुक्तता होईल असे साधूंनी सांगितले.
उत्तराखंड
उत्तराखंडमधील कुरझन, क्विली आणि जौदला या गावांमध्ये ३०० वर्ष झाली होळी साजरी केलेली नाही. लोककथा अशी सांगितली जाते की, या गावांचे रक्षण त्रिपुरा देवी करते. आणि या देवीला दंगा आवडत नाही. म्हणजे जास्त आवाज आवडत नाही. त्यामुळे या गावांनी होळी करणेच बंद केले आहे. रूद्रप्रयाग जिल्ह्यात असलेले ही गावे केवळ होळीच नाहीतर ध्वनी प्रदुषण होणारा कोणताही सण साजरा करत नाहीत.
झारखंड
झारखंडमधील बोकारोच्या जवळ असलेल्या दुर्गापूर गावात १०० वर्षांपासून होळी बॅन आहे. यामागील कारण असं सांगितलं जातं की, १०० वर्षांपूर्वी गावातील राजाच्या मुलाचे निधन होळी दिवशी झाले होते. त्यानंतर योगायोग म्हणजे होळी जवळ आली असताना अचानक राजाचीह प्रकृती बिघडली.
मृत्यू समोर दिसत होता अशात होळीचा दिवस उजाडला. तेव्हा राजाने गावकऱ्यांनो सुरक्षित रहायचे असेल तर होळी साजरी करू नका असा आदेश दिला अन् राजा यमसदनी गेला.राजाच्या मृत्यूनंतर गावकरी आजही तो आदेश पाळत आहेत.
गुजरात
गुजरातमधील बसानकाठा गावातील लोक २०० वर्षांपासून होळी साजरी करत नाहीत. त्यांचेही असे म्हणणे आहे की, या गावाला काही साधूंनी शाप दिला होता. की जर होळी साजरी केली तर खूप मोठ्या नुकसानाला सामोरे जावे लागेल. तेव्हापासून गावकरी होळी साजरी करत नाहीत.
तामिळनाडू
तामिळनाडुमध्येही होळी साजरी केली जात नाही. दक्षिण भारताच्या तुलनेत उत्तर भारतात होळी जल्लोषात साजरी केली जाते. फाल्गुन महिन्यातील पौर्णिमेदिवशी होळी साजरी केली जाते. तेव्हा दक्षिण भारतात मासी मागम साजरा केला जातो.
गोव्यातील 'या' बेटासमोर बालीचे सौंदर्य पडेल फिके, एकदा भेट द्याल तर पुन्हा जाल!
Goa Travel : भारतातील सर्वात लोकप्रिय पर्यटनस्थळांमध्ये गोव्याचा प्रामुख्याने समावेश केला जातो. गोव्याचे सौंदर्य एवढे अप्रतिम आहे की, दरवर्षी देश-विदेशातील असंख्य पर्यटक गोव्याला आवर्जून भेट देतात. गोव्यात अशी अनेक सुंदर आणि मनमोहक ठिकाणे आहेत, जिथे दररोज कित्येक लोक आपल्या कुटुंबासह, मित्र-मैत्रिणींसह सुट्टीचा आनंद घेण्यासाठी आवर्जून येतात.
गोव्यातील समद्रकिनारे, किल्ले, चर्च, मंदिरे येथील नाईट लाईफ आणि खाद्यसंस्कृती पर्यटकांना आकर्षित करते. खास करून येथील सुप्रसिद्ध समुद्रकिनारे जसे की, कळंगुट बीच, बागा बीच, अंजुना बीच इत्यादी समुद्रकिनारे अनेकांना माहित असतीलच. मात्र, या समुद्रकिनाऱ्यांव्यतिरिक्त गोव्यात एक असे अप्रतिम बेट आहे, ज्याच्यासमोर बालीचे सौंदर्य ही फिके पडेल. कोणते आहे हे बेट? चला तर मग जाणून घेऊयात.
दिवार बेट कुठे आहे ?
दिवार हे बेट गोव्यामध्ये स्थित असून ते चहुबाजूंनी पाण्याने वेढलेले आहे. गोव्याची राजधानी असलेल्या पणजीपासून १० किमी अंतरावर हे मनमोहक बेट स्थित आहे. हे बेट घनदाट जंगल, निसर्गाचे सौंदर्य आणि पाण्याने वेढलेले आहे. या ठिकाणी आल्यावर तुम्हाला स्वर्गात आल्यासारखी अनुभूती येईल, यात काही शंका नाही.

diwar islandesakal
या बेटावर जाण्यासाठी कोणताही रस्ता नाही. तुम्हाला या ठिकाणी जायचे असल्यास, जुन्या गोव्यातून केवळ फेरी बोटीद्वारे तुम्ही या बेटावर जाऊ शकता. या बेटावर तुम्हाला नैसर्गिक सौंदर्य आणि शांतता अनुभवायला मिळेल. गोव्यात आल्यावर तुम्ही या ठिकाणी भेट द्यायला काहीच हरकत नाही.
विशेष म्हणजे या बेटाला ऐतिहासिक वारसा लाभला असून या ठिकाणी अनेक प्रकारचे पक्षी पहायला मिळतात. येथे स्थलांतरित पक्ष्यांची मोठी संख्या तुम्हाला दिसून येईल. (where is diwar island)
दिवार बेटावर घालवा निवांत वेळ
दिवार बेट हे निसर्गप्रेमींसाठी स्वर्गापेक्षा ही काही कमी नाही. जर तुम्हाला रोजच्या धावपळीच्या जीवनातून थोडा ब्रेक हवा असेल, तर त्यासाठी दिवार बेट हा उत्तम ऑप्शन आहे. येथील शांततापूर्ण वातावरणात तुम्ही निवांत वेळ घालवू शकता. हे बेट दिसायला जरी लहान असले तरी हा परिसर निसर्गसंपन्न आहे. छोटी-मोठी झाडे, विविध प्रकारचे पक्षी तुम्हाला नक्कीच भुरळ घालतील.

Diwar Islandesakal
दिवार बेटावर तुम्ही सायकलिंग आणि बोटिंग देखील करू शकता. सायकलिंग आणि बोटिंगसाठी दिवार हे बेट सुप्रसिद्ध आहे. अनेक पर्यटक येथे खास सायकलिंग आणि बोटिंग करण्यासाठी येतात. यासोबतच येथील विविध प्रकारची मंदिरे, पोर्तुगीज शैलीतील घरे पाहण्यासारखी आहेत. (spends relaxing time at Diwar Island)
दंडोबा-गिरलिंग बनेल शिव-शक्तिपीठ; 'ही' प्राचीन स्थळे होतील जिल्ह्याची ठळक ओळख
जिल्हा नव्हे, तर राज्यातील एक नामांकित शिवतीर्थ बनविण्यासाठी प्रबळ इच्छाशक्तीची गरज आहे. सांगली जिल्ह्याचे महाबळेश्वर म्हणून ओळख बनण्याइतपत ही दोन तीर्थक्षेत्रे बनू शकतील.
सांगली : जिल्ह्याच्या पर्यटन (Sangli Tourism) व धार्मिक स्थळांचा मानबिंदू म्हणून श्री क्षेत्र दंडोबा (Dandoba Temple) व श्री क्षेत्र गिरलिंग (जुना पन्हाळा) यांची ओळख आहे. भोसे, मालगाव, सिद्धेवाडी, खंडेराजुरी व खरशिंग गावच्या सुमारे १ हजार १५० हेक्टर क्षेत्रावरच्या विस्तीर्ण पसाऱ्यावर निसर्गाने मुक्तहस्ते उधळण केली आहे.
तर तेथून जवळच असलेल्या जुना पन्हाळा अर्थात गिरलिंग देवस्थान हे देखील एक पर्यटन क्षेत्र शिवभक्तीचे केंद्र ठरू शकते. जिल्हा नव्हे, तर राज्यातील एक नामांकित शिवतीर्थ बनविण्यासाठी प्रबळ इच्छाशक्तीची गरज आहे. सांगली जिल्ह्याचे महाबळेश्वर म्हणून ओळख बनण्याइतपत ही दोन तीर्थक्षेत्रे बनू शकतील.
गिरलिंग देवस्थानची वैशिष्ट्ये
सुमारे ४०० एकर निसर्गरम्य डोंगर
सुमारे १२०० वर्षांपूर्वी शिवलिंगाची स्थापना
दाट झाडीने पर्यावरणाचे संवर्धन व संरक्षण
मानसिक स्वास्थ्य, प्रसन्न, आनंददायी निसर्ग ठिकाण
विस्तीर्ण पठारावर रंगीबेरंगी अनेक वनस्पतींचा खजिना
रामायणकालीन मंदिरात चैतन्यमय, उत्साही वातावरण
मंदिरासमोर पराशय ऋषींची, तर मंदिराच्या मध्ये वसिष्ठ ऋषींची संजीवन समाधी
अलीकडेच जांभ्या खडकातील बौध्दकालीन लेण्यांचा शोध
तीन घळींमुळे तिघई लेणी नावाचा परिसर प्रसिध्द
दंडोबाची वैशिष्ट्ये
विस्तीर्ण डोंगराच्या टोकावर पुरातन दंडनाथ मंदिर
डोंगर पोखरून पुरातन गुहेत बांधलेली पिंड, जांभ्या दगडात कोरलेला सभामंडप
नागाच्या वेटोळ्यातील दंडनाथाची मूर्ती, अखंड धुनी.
मंदिराच्या माथ्यावर सुमारे ३०० वर्षांपूर्वी उभारलेले महाकाय पाचमजली शिखर
बाजूलाच सुमारे ५ किलोमीटर अंतरावर श्री गिरलिंग देवस्थान (जुना पन्हाळा)
ट्रेकिंगसाठी आरोग्यदायी व पर्यावरणपूरक उत्तम ठिकाण
विविध प्रकारचे प्राणी, पक्षी व रंगीबेरंगी फुलांची वनसंपदा
नैसर्गिक घळी, नागमोडी रस्ता, घाट, छोटे-मोठे डोंगर, असंख्य गुहा, दऱ्या
भुयारी प्रदक्षिणा मार्ग असणारे पश्चिम महाराष्ट्रातील पहिले देवस्थान
बारमाही गारवा असणारे हिल स्टेशन
बारापैकी ४ जोतिर्लिंगांच्या मूर्ती
केदारलिंग, गुप्तलिंग, काळभैरव, शिवलिंग, महिषासूरमर्दिनी,
श्री विष्णूची दगडात कोरलेली मूर्ती
निसर्गाची विविध रूपे दंडोबा डोंगर परिसरात पाहायला मिळतात. काही वर्षांपूर्वी दंडोबा डोंगर परिक्रमा उपक्रम राबवण्याचा उपक्रम तीनवेळा केला. शिखरावरील ध्वजाला दृष्टिपथात ठेवून केलेली ही परिक्रमा अनेक अर्थांनी महत्त्वपूर्ण ठरली. एक ते दीड तासाच्या कालावधीत सुमारे सव्वासहा किलोमीटरची ही परिक्रमा विद्यार्थ्यांपासून अाबालवृध्दापर्यंत कोणीही पूर्ण करू शकेल, इतका सोपा मार्ग आहे.’’
-अभय मोरे, गिर्यारोहक, सांगली.
समुद्र मंथनावेळी बाहेर पडलेलं अमृत या मंदिरात आजही आहे, काळभैरव करत आहेत रक्षण
Mahashivratri 2024 : हिंदू धर्मात अनेक पौराणिक गोष्टी सांगितल्या जातात. समुद्रातून अमृत बाहेर काढलं होतं ती गोष्टही तुम्ही ऐकली असेलच. देव आणि दानवांच्यात अमृत मिळवण्यासाठी झालेले युद्ध, त्यात मोहिनी रूप घेतलेले श्री विष्णू आणि विष प्राशन केलेले महादेवांची गोष्ट आहे.
त्यावेळी समुद्र मंथनातून बाहेर पडलेलं अमृत कलश आजही आपल्याला पहायला मिळतो. तो नदीमध्ये अदृश्य स्वरूपात आहे. तो कोणत्या मंदिरात आहे. याबद्दल आपण माहिती घेऊयात.
समुद्र मंथन केल्यावर त्यातून अनेक माणके, हिरे मोती बाहेर पडले. जेव्हा अमृताचा कलश बाहेर आला. तेव्हा तो घेऊन दानव पळू लागले आणि तो कलश मिळवण्यासाठी देवही त्यांच्या पाठी पळू लागले. तेव्हा सर्व देव भगवान विष्णूंकडे गेले. अमृताचा कलश परत मिळवावा, तो चुकीच्या हातात जाऊ नये अशी याचना सर्व देवांनी विष्णूंना केली.
तेव्हा भगवान विष्णू मोहिनी या एक सुंदर स्त्रीचे रूप घेऊन त्या ठिकाणी गेले. मोहिनी रूपावर राक्षस भाळले अन् त्या स्त्रीला त्यांनी अमृत कलश देऊन टाकला. नेवासे गावात हे अमृत वाटपाचे काम सुरू केले. मोहिनीने अमृत वाटपाला सुरूवात केली. तेव्हा सर्वात आधी देवांना अमृत वाटप केलं जात होते. अन् राक्षसांना भलतच काहीतरी दिल जात होतं.
ही गोष्ट राक्षस असलेल्या राहूच्या लक्षात आली. तेव्हा त्याने देवांचे रूप घेऊन तो तिथे पंगतीत जाऊन बसला. आणि जेव्ह अमृत त्याच्या हातात आले तेव्हा तो पिण्यासाठी तोंडाला लावणार तोच भगवान श्री कृष्णींनी सुदर्शन चक्राने त्याचे शीर धडापासून वेगळे केले.
राहूचं शीर उडवल्यानंतर देव-दानवांच्यात पुन्हा युद्ध सुरू झालं. या भांडणात हे अमृत प्रवरा नदीमध्ये सांडलं. प्रवरा नदीत सांडल्यानंतर अमृत प्रवाहीत व्हायला लागलं. तेव्हा महादेवांनी काळभैरव देवांना आदेश दिला की, हे काळभैरवा तुम्ही पुढे जाऊन नदीत एक कुंड बनवून त्यामध्ये हे अमृत साठवून ठेव.
भगवंत काळभैरवही आदेशाचे पालन करत प्रवरानदीच्या प्रवाहात पुढे गेले. अन् त्यांनी महादेवांचे नाव घेत त्रिशुलाने नदीत एक कुंड तयार केला. राक्षसही त्या ठिकाणी येत होते. तेव्हा काळभैरवांनी सांगितले की, अमृत तुझ्या पोटात लपवून ठेव अन् त्यावरून प्रवाहीत हो. देवांचा आदेश प्रवरा नदीनेही ऐकला अन् तिने ते अमृत लपवून ठेवले.

आजही हे अमृत कलश महाराष्ट्रातील अहिल्यानगर जिल्ह्यातील नेवासे गावात आहे. इथे नदीवर असलेल्या काळभैरवाच्या मंदिराखाली हा कलश आहे. त्यावरच पाण्यात हे मंदिर उभारण्यात आलं आहे. आजही श्री काळभैरव त्या कलशाचे रक्षण करतात.
तसेच या अमृताच्या रक्षणासाठी आणि राक्षसांना थांबवण्यासाठी काळभैरवांनी अष्टभैरवांनाही अवाहन केले होते. अष्टभैरवांच्या आठ मूर्तीही इथे या मंदिरात पहायला मिळतात.

हॉलिवूड, थायलंड, पट्टाया इथला समुद्र कोकणी माणसासाठी निसर्गानं 'या' गावाला दिलाय!
‘बुधल’ हे नाव समुद्राशेजारील क्षेत्र दर्शवते. प्राचीन काळी याला ‘बुद्धिग्राम’ किंवा ‘बुद्धदुर्ग’ असेही म्हणत. हे एकेकाळी भरभराटीचे बंदर होते.
-पराग वडके, चिपळूण parag.vadake@gmail.com
गुहागर (Guhagar) तालुक्यातील बुधल गावाची गंमत म्हणजे गाव टप्प्यात येईपर्यंत आपल्याला समुद्रकिनारा दिसत नाही आणि अचानक समुद्राचे दर्शन होते, जसे ताजमहाल पाहताना आपल्या अंदाज नसतो. पुढे ताज ताज म्हणजे नेमके काय आहे आणि अचानक अवाढव्य ताज उभा राहतो अगदी तशीच अनुभुती बुधल गावचा (Budhal Village) समुद्र किनारा समोर उभा ठाकला की देतो. हॉलिवूड, थायलंड, पट्टाया इथला समुद्र कोकणी माणसासाठी निसर्गाने बुधल गावाला दिला आहे.
तुम्हाला जर हॉलिवूडला (Hollywood) जायचे असेल तर लाखो रुपये खर्च येतो; पण जर अतिशय कमी खर्चात, हॉलिवूडपेक्षा लय भारी अशा समुद्रकिनारी भेट द्यायची असेल तर सरळ बुधल गाव गाठायचे. गुहागर तालुक्यातील बुधल गाव, याला बुधल सडा असेपण म्हणतात. बुधल गाव, बुधल सडा किंवा बुधलकोंड हे सरासरी पर्यटन नकाशावर नाहीत. गुहागर-वेळणेश्वर रोडवरून उजवीकडे वळणारा फाटा अडूरजवळ बुधलकडे जातो जे सुमारे ३०-४० कोळी लोकांची पारंपरिक घरे असलेले गाव, साधारण १२०० वर्ष जुने आहे.
‘बुधल’ हे नाव समुद्राशेजारील क्षेत्र दर्शवते. प्राचीन काळी याला ‘बुद्धिग्राम’ किंवा ‘बुद्धदुर्ग’ असेही म्हणत. हे एकेकाळी भरभराटीचे बंदर होते; पण आता तिथे फक्त कोळी समाज राहतो आणि मासेमारी करतो. गावातील तरुण पिढी नोकरीधंद्यासाठी पुणे-मुंबई येथे आहे. गावात शिरण्यापूर्वी तुम्हाला डाव्या बाजूला एक पाखाडी लागते. साधारण दीडशे पायऱ्या वर गेल्यावर डोंगरात दुर्गादेवीचे मंदिर (Durga Devi Temple) आहे. हे पेशवेकालीन मंदिर आहे, असे स्थानिक गावकरी सांगतात आणि पूर्वी सोन्याचे कळस होते. तेथून संपूर्ण गुहागरचा समुद्र दिसतो. तिथे फोटोग्राफी केल्यावर थेट डोंगर उतरून गावात जायचे. तिथेच एक मोठा सडा आहे.
सडा म्हणजे कातळाची टेकडी आणि अफाट समुद्र. तुफान वेगात तो या कातळाला धडका देत असतो. काही ठिकाणी तर खडक चिरला गेला आहे. मस्त फोटो काढल्यावर आता मात्र रूपेरी वाळू आणि निळा हिरवा रंगाचा जणू पाचू कलरचा साडी नेसलेला बीच खुणावतो. असा रंग कोकणातील फार थोड्या बीचला लाभला आहे. बीचकडे जाताना कोळी घराच्या गल्ल्या गल्ल्या ओलांडत जातानासुद्धा फोटोग्राफरसाठी लुभावणारी दृश्ये पाहायला मिळतात. कोणी वृद्ध कोळी तुटलेले जाळे विनंती असतो तर कोळी आजी आदल्या दिवसाचे वाळवलेले मासे पालटत असतात. लहान मुले बिनधास्त समुद्रात उंचावरून उड्या घेत असतात. कोळी स्त्रिया घरातील कामे करत असतात आणि हळूच तुम्ही सोनवाळूमध्ये प्रवेश करता, अशी सोनेरी वाळू , हे गुहागरच्या समुद्राचे वैशिष्ट्य आहे.
अशी हुबेहूब वाळू, भुवनेश्वर किनारी आढळते आणि राजस्थानमध्ये जैसलमेरला. अलगद पायाला गुदगुदल्या करत वाळू तुम्हाला समुद्रात घेऊन जाते. या बीचचे वैशिष्ट्य म्हणजे अतिशय सुरक्षित बीच. अगदी लहान मुलेसुद्धा पुढपर्यंत जाऊ शकतात. कधीही बुडण्याच्या घटना घडलेल्या नाहीत. समुद्र शांत असेल तर इथं समुद्राचा तळसुद्धा दिसतो. येथील सनसेट पाहायला विसरू नका कारण, अप्रतिम रंगाचा खेळ अनुभवता येतो. याच किनाऱ्याला थोडे पुढे चालत गेले तर छोटे छोटे कातळ आहेत. त्यावर बसून चित्रपटात पाहतो तसे नजरे क्लिक क्लिक करता येतात. या गावातच आफ्रिकेतील बाओबा नावाचे झाड आढळते.
साधारण सात लोकांनी घेर केला तर तेवढा घेर या झाडाचा आहे. स्थानिक नाव गोरखचिंच असे म्हणतात आणि संपूर्ण कोकण किनाऱ्यात फार क्वचित ही झाडे दर्शन देतात. तिथे कोणालाही फोटो काढायला मजा येते. बीचवर जाताना वाटेतच आहे. या बीचचे मला आवडलेले वैशिष्ट्य म्हणजे हा बीच फारसा कोणाला माहित नाही. त्यामुळे अतिशय गर्दी कमी, नसतेच कोणी म्हणाना. स्वच्छ समुद्रकिनारा आणि कोळी लोकांची लगबग. थोडक्यात, हॉलिवूड , थायलंड, पट्टाया इथला समुद्र कोकणी माणसासाठी निसर्गाने बुधल गावाला दिला आहे. कधी भेट दिलीत तर खाण्याच्या वस्तू घेऊन जा. तिथे एकही हॉटेल नाही आणि नाही तेच बरं.
(लेखक दऱ्याखोऱ्यांतून भटकंती करणारा सामाजिक कार्यकर्ता आहे.)
'शरीर आणि मन हलकं करणारा रानगंध'
उलट छातीत तो भन्नाट वारा आणि रानगंध शरीर आणि मन हलकं करतात. ती इवली रानफुलं कौतुकानं आपल्याकडे पाहात असतात.
पावसातला, ढगातला, धुक्यातला, स्वच्छ उन्हातला हा चौकारण्यातला प्रवास अखेरीस बारमाही निवळ शंख असणाऱ्या खालच्या पाण्यापर्यंत येऊन पोहोचला होता. गच्च जंगलातली खालच्या पाण्यापर्यंतची पायपीट म्हणजे अरण्य अनुभूतीचा विलक्षण रोमांच अगदी झाडेच हिरवी नव्हेत तर दगडसुद्धा हिरव्यागार पाचूसारख्या बुरशीने वेढलेले. आरपार पारदर्शी पाण्याचे ते नितळ प्रवाह, त्यांचे सौंदर्य केवळ वर्णनातीत हे पाणी दरीत झेपावतं. ते फेसाळणारा प्रचंड जलप्रपात बनूनच.
पाण्याच्या वरच्या अंगाला चौकारण्यातला ‘खालचा भैरी’ प्रवाहाच्या काठाकाठाने त्या भैरीपर्यंत जाणं ही पुन्हा एक वेगळी रोमांचकारी अरण्यानुभती. सूर्याचा किरणही पोहोचणार नाही, अशा गच्च जंगलात पाण्याच्या प्रवाहाशेजारी दगडांच्या ओळीत एक वेगळा थोडा मोठा गोल तांदळा, तोच ‘भैरी’. भर जंगलात (Forest) शतकानुशतके वसलेल्या त्या भैरीला अक्षरश: साष्टांग दंडवत घातला. चौकारण्य अजून सरलं नव्हतं... सरणारही नव्हतं; पण दुपार उलटली होती. दिवस बुडायच्या आत माचाळ जवळ करणं आवश्यक होतं.
ओढे-नाले गच्च रानपार करत चढा उतारानं बरीच पायपीट परतीला करावी लागणार होती. सिंकाड्याचे आवाज वाढू लागले होते. शेकरुंचा चकचकाट शिगेला पोहोचला होता. पावसाचे पाणी जागोजागी मुबलक असलं तरी चराईसाठी संधीकालापासून गव्यांचा संचार वाढणार होता. अंधाराच्या आत जंगलातून बाहेर पडावं हा निसर्ग नियम आणि मुख्य म्हणजे तुकाराम आणि बहिणींचा स्वयंपाक वाडीत वाट पाहात होता. प्रत्येक जंगलात तीच झाडं, वेली, वृक्ष, पाणी-माती असलं तरी प्रत्येक जंगलाचा स्वभाव आणि सौंदर्य वेगळं असतं. त्याचा गंधही वेगळा असतो. काही जंगल कधी संपतील, असं होतं तर काही संपूच नये असं वाटतं, त्यातलंच हे चौकचं जंगल.
खरंतर हे चौकच जंगल मला पहिल्यांदा मूळचे प्रभानवल्लीच्या परिसरातले, परंतु आता कोल्हापूरकर असणारे चंदू नार्वेकर आणि उदय नागवेकरांनी सांगितल तेव्हापासून ते खुणावत होते. आज तो योग जुळून आला. सह्याद्रीच्या अंतरंगात अशा अनेक अस्पर्श जागा आहेत. त्यांचं सौंदर्य कल्पनातीत असतं अशा जागा कोणीतरी सांगतं. मग त्या जागा मनातून हटत नाहीत. सारख्या जणू बोलावतात. तेथे गेल्याशिवाय चैन पडत नाही.
तिथे आपण आणि निसर्गाशिवाय कोणीही नसतं. तिथे माणसांची गर्दी नसते. तिथे वारा मावत नाही. वास आफ्या गुदमरत नाही. उलट छातीत तो भन्नाट वारा आणि रानगंध शरीर आणि मन हलकं करतात. ती इवली रानफुलं कौतुकानं आपल्याकडे पाहात असतात. फांद्यावरचे पक्षी आपल्याकडे डोळा ठेवून असतात आणि हे सारं समजायला लागलं की आपणही त्यांच्यातलेच एक होऊन जातो आणि जंगल हे आपलं घर बनतं. (क्रमशः)
रात्रीच बंद होणाऱ्या मंदिरात दररोज महादेवांच्या पिंडीवर फुलं कोण वाहतं?
Mahashivratri 2024 : भारत हे अनेक धर्म आणि श्रद्धांचे केंद्र आहे. जगातील सर्व धर्मांमध्ये चमत्काराच्या कथा ऐकायला मिळतात. यापैकी काही चमत्कारांच्या कथा दंतकथांच्या रूपात एका पिढीकडून दुस-या पिढीला सांगितल्या जातात. तर काही आजही तेथे घडणाऱ्या रहस्यमय गोष्टींमुळे ओळखल्या जातात.
अशाच एका चमत्काराची कथा मध्य प्रदेशातील विदिशा येथील गंज बासोदा तालुक्याच्या उदयपूर गावातील महादेवाच्या मंदिराशी संबंधित आहे. दररोज सकाळी उदयपूर गावातील निळकंठेश्वर मंदिराचे दरवाजे उघडले असता पुजारी आणि सेवकांना शिवलिंगावर असे काही सापडते जे एखाद्या चमत्कारापेक्षा कमी नाही.
स्थानिक लोकांच्या मते दररोज सकाळी जेव्हा मंदिराचे दरवाजे उघडतात. निळकंठेश्वर मंदिराचे दरवाजे उघडले असता, शिवलिंगावर फुले वाहिलेली आढळतात. स्थानिक लोक या चमत्काराबद्दल अनेक कथा सांगतात. काही लोक म्हणतात की परमार वंशाचे राज्यकर्ते शिवाचे उपासक होते. त्यांनी आपल्या 250-300 वर्षांच्या राजवटीत अनेक मंदिरे बांधली. निळकंठेश्वर मंदिर परमार वंशाचा राजा उदयादित्य याने बांधले होते.

असे मानले जाते की बुंदेलखंडचे सेनापती, आल्हा आणि उदल हे महादेवाचे इतर भक्त होते. तेच दोन वीर रोज रात्री इथे येतात आणि महादेवाची पूजा करून त्यांना कमळ अर्पण करतात. मग सकाळी मंदिराचे दरवाजे उघडल्यावर महादेवाच्या चरणी फुले अर्पण केलेली आढळतात. नीलकंठेश्वर मंदिरात रात्रीच्या वेळी प्रवेश पूर्णपणे निषिद्ध आहे.
मंदिराच्या शिखरावर दिसते माणसाची आकृती
निळकंठेश्वर मंदिराशी संबंधित आणखी एक समज आहे. हे मंदिर एकाच व्यक्तीने एका रात्रीत बांधले असे लोक मानतात. बांधकाम पूर्ण करून ती व्यक्ती मंदिराच्या माथ्यावरून खाली आली होती. तेव्हा त्याची साहीत्याची झोळी वरच्या बाजूला राहिल्याचे त्याच्या लक्षात आले.
झोळी खाली घेण्यासाठी तो पुन्हा वर चढला. पण, तो खाली उतरण्याआधीच कोंबडा आरवला. अशा स्थितीत ती व्यक्ती तिथेच राहिली. त्यामुळे आजही मंदिराच्या शिखरावर त्या व्यक्तीचा आकार पाहायला मिळतो.
मुघलांनी मूर्तीचा नाश करण्याचा प्रयत्न केला
उदयपूर आता राजा उदयादित्यच्या शहरातील एका छोट्या जागेत मर्यादित आहे. त्याचवेळी महाशिवरात्रीला निळकंठेश्वर मंदिरात भाविकांची मोठी गर्दी होते. हे मंदिर विदिशाच्या गंज बासोदा तालुक्याच्या रेल्वे स्टेशनपासून अवघ्या 22 किमी अंतरावर असलेल्या उदयपूर गावात आहे. हे मंदिर स्थापत्यशैलीचा एक विशेष नमुना आहे.
मंदिराची रचना भोपाळजवळील भोजपूर महादेव मंदिरासारखी आहे. मंदिराच्या आवारात बांधलेल्या देवांच्या मूर्ती आता मोडकळीस आल्या आहेत. त्याची वाईटरित्या विटंबना करण्यात आली आहे. काही मूर्तींचे मुख गायब आहे. तर काहींचे हात गायब आहेत.

सूर्याचा पहिला किरण शिवलिंगाला अभिषेक करतो.
मंदिराचे मुख्य प्रवेशद्वार अशा प्रकारे बनवले आहे की सूर्याचे पहिले किरण महादेवाला अभिषेक घालते. दर महाशिवरात्रीला येथे पाच दिवसांची जत्रा भरते. मुख्य मंदिर मध्यभागी बांधलेले आहे. त्याला तीन प्रवेशद्वार आहेत. गर्भगृहात शिवलिंग स्थापित केले आहे, ज्यावर उगवत्या सूर्याची किरणे फक्त महाशिवरात्रीच्या दिवशी पडतात.
शिवलिंगावर पितळी आवरण असते, ते शिवरात्रीलाच काढले जाते. शिवलिंगाची गोलाकार 5.1 फूट असून जमिनीपासून उंची 6.7 फूट आहे. त्याचवेळी जिलेहरीच्या वरच्या शिवलिंगाची लांबी 3.3 फूट आहे. मंदिरात भगवान गणेश, भगवान नटराज, महिषासुर मर्दिनी, भगवान कार्तिकेय यांच्याही मूर्ती आहेत. याशिवाय स्त्री सौंदर्याचे दर्शन घडवणारी शिल्पेही आहेत.

ब्रेक घ्या, डोकं
रत्नागिरीतील देवडे, किरबेट बनणार 'मधाचे गाव'; लोकांना गावातच मिळणार रोजगार, मधूपर्यटनालाही चालना
शेतकऱ्याने दहा मधपेट्या बाळगल्यास वर्षाला ३०० किलो मध मिळतो. वर्षाकाठी एका शेतकऱ्याला दीड ते पावणेदोन लाख रुपये प्राप्त होतात.
रत्नागिरी : मधमाशी संवर्धनासोबत (Beekeeping) मध उत्पादनाला प्रोत्साहन देण्यासाठी जिल्ह्यातील देवडे आणि किरबेट ही दोन गावे मधाचे गाव बनवण्यात येणार आहेत. राज्यात मांघर, पाटगावनंतर रत्नागिरी (Ratnagiri) जिल्ह्यातील दोन गावांची निवड करण्यात आली आहे. मधाचे गाव संकल्पनेमुळे लोकांना गावातच रोजगार मिळणार असून, कृषी पर्यटनाच्या (Agritourism) धर्तीवर मधूपर्यटनालाही चालना मिळू शकते.
शेती उत्पादनात मधमाशांमुळे होणाऱ्या परागीकरणामुळे ३५ ते ४० टक्के वाढ होते. मधमाशांची संख्या वाढावी तसेच त्यांचा सकारात्मक प्रसार व्हावा, या उद्देशाने खादी ग्रामोद्योग विभागाने हा उपक्रम हाती घेतला आहे. विशाळगडाच्या पायथ्याशी देवडे आणि किरबेट ही दोन गावे वसलेली आहेत. निसर्गसंपन्न गावामध्ये कुऱ्हाडबंदी आहे. वृक्षतोड केली जात नसल्यामुळे या गावात मोठ्या प्रमाणात जैवविविधता आहे. या गावातील शेतकरी (Farmer) सेंद्रिय पद्धतीने शेती करतात.
यासाठी सामाजिक कार्यकर्ते अनिल कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली ६० शेतकऱ्यांनी सेंद्रिय प्रमाणीकरणही केले आहे. त्यामुळे मधमाशांना आवश्यक मुबलक फुलोरा खाद्य येथे मिळू शकते. गावात २०० ते ३०० मधमाशांच्या कॉलन्या आहेत. या गावात सातेरी, आग्या मधमाशांच्या जाती आढळतात. पारंपरिक पद्धतीने मध काढून त्याची विक्री करणे हा येथील शेतकऱ्यांचा व्यवसाय आहे; परंतु आधुनिक पद्धतीने हा व्यवसाय करता यावा यासाठी शेतकऱ्यांना आवश्यक ते प्रशिक्षण देण्यात आले आहे. त्यांना ४० गट गावातील शेतकऱ्यांना देण्यात आले होते. त्यामधून शेतकऱ्यांना दिडशे किलोपर्यंत मध मिळत आहे.
एक हजार पेट्यांमध्ये उपक्रम
या उपक्रमांतर्गत एक हजार पेट्या मधपालनासाठी देण्यात येणार आहेत. पहिल्या टप्प्यात ५०० पेट्या देण्यात येणार असून, आतापर्यंत ५० मधपालांना ४० पेट्या दिल्या आहेत. जिथे फुलोरा जास्त आहे त्या काळात एका मधपेटीतून सामान्यतः २५ ते ३० किलो मध निघतो. शेतकऱ्याने दहा मधपेट्या बाळगल्यास वर्षाला ३०० किलो मध मिळतो. वर्षाकाठी एका शेतकऱ्याला दीड ते पावणेदोन लाख रुपये प्राप्त होतात. या व्यतिरिक्त मधाच्या पोळ्यातून निघणाऱ्या मेणापासून अन्य उत्पादनेही तयार करता येतात. देवडे आणि किरबेट ही गावे विशाळगडाच्या पायथ्याशी असल्यामुळे ऑक्सिजन पातळी चांगली आहे.
मधमाशी संवर्धनासोबत मध संकलनाचा व्यवसाय आधुनिक पद्धतीने करून गावात अर्थार्जनाचे साधन उपलब्ध व्हावे, यासाठी मधाचे गाव हा उपक्रम राबवला जात आहे. देवडेसारख्या निसर्गसंपन्न अशा गावामध्ये यासारख्या उपक्रमामधून उदरनिर्वाहाचे साधन निर्माण करता येईल.
-अनिल कांबळे, देवडे
जगातलं हटके स्टेशन, एकही रेल्वेचा कर्मचारी नाही, प्रवासीच तिकीट काढतात अन् स्वच्छताही करतात
Railway Station :
जगाच्या कानाकोपऱ्यात अशा गोष्टी घडत असतात. ज्याबद्दल आपल्याला काहीच कल्पना नसते. आज अशीच एक घटना आपण पाहणार आहोत. ज्याबद्दल कुणाला काही कल्पना असेल असे वाटत नाही. कारण, जगात असे लोकही असतात जे कोणताही गाजावाजा न करता आपलं काम वर्षानुवर्षे करत आहेत.
भारतात असंही एक रेल्वे स्टेशन आहे जिथ कोणताही कर्मचारी नाही. तरीही तिथले लोक रोज न चुकता ते स्टेशन स्वच्छ करतात. अन् तिथे तिकीट कलेक्टर बनून स्वत:च तिकीट काढतात. आणि रेल्वेत बसून प्रवासालाही जातात. होय हे खरं आहे. राजस्थानमधील सीकर-चुरु मार्गावर असलेल्या रसीदपुरा खोरी येथे हे स्टेशन आहे.
आर्थिक नुकसान होतं असं कारण देत भारतीय रेल्वेने हे स्थानक बंद केले होते. मात्र ते बंद झाल्याने ग्रामस्थांना वाहतुकीत अडचणी येत होत्या. यामुळे त्यांनी हे स्थानक चालवण्यासाठी रेल्वेकडे अनेक विनंत्या केल्या. या स्थानकाच्या साफसफाईपासून तिकीट बुकिंगपर्यंतची सर्व कामे ग्रामस्थ करतात.
2004 मध्ये बंद पडलेले रशीदपुराचे खोरी रेल्वे स्थानक संपूर्ण देशासाठी एक उदाहरण बनले आहे. हे स्टेशन 1942 मध्ये बांधले होते. मात्र वार्षिक उत्पन्न कमी असल्याने रेल्वे विभागाने हे स्टेशन 2004 मध्ये बंद केले. अशा परिस्थितीत आजूबाजूच्या लोकांना कुठेही जाण्यास त्रास होऊ लागला. लोकांनी रेल्वेकडे अनेक मागण्या केल्या. अखेर रेल्वेने स्थानक पुन्हा सुरू करण्यासाठी काही अटी घातल्या.
या ठिकाणाहून तीन लाख तिकिटांची विक्री झाली तरच ते सुरू होईल, असे रेल्वेचे म्हणणे आहे. अखेर गावकऱ्यांच्या मदतीने हे स्टेशन सुरू करण्यात आले. आजही ते गावकरीच चालवतात. इथे येणाऱ्या लोकांची तिकिटे गावकरीच खरेदी करतात आणि मग प्रवास करतात. एवढेच नाही तर स्थानकाच्या स्वच्छतेची जबाबदारीही ग्रामस्थांवर आहे.
रेल्वेने घेतला निर्णय
इतकी वर्षे ग्रामस्थांनी चालवल्यानंतर हे स्टेशन आता हायटेक करून वीस कोटी रुपये खर्चून सुरू करण्यात येणार आहे. याशिवाय नव्या शासकीय कर्मचाऱ्यांचीही येथे नियुक्ती करण्यात येणार असल्याची माहिती रेल्वे मंत्रायलाकडून ग्रामस्थान देण्यात आली आहे.
Devbagh Beach : 'लोक गोव्यात जातात आणि पी पी पितात; पण तेथून थोड्या अंतरावर असलेला निसर्ग प्यायला विसरतात!'
Devbagh Beachesakal
मुंबई-गोवा महामार्ग पकडायचा आणि मालवण गाठायचे; पण मालवणात मुक्काम करण्यापेक्षा देवबागला मुक्काम करा.
-पराग वडके, चिपळूण parag.vadake@gmail.com
‘लॉंचमध्ये मस्त दणकून उडी मारली. गौरवने (आमचा मित्र पुढच्या प्रवासातला कम गाईड) हात दिला आणि परूळे धक्का सोडला. गोवा ते कुडाळ लाल डबा मार्चचे रणरणते ऊन आणि सोबत ५ मित्र. कोण नागपूर, नांदेड, सोलापूर तर कोणी जळगाववाला. सगळे महाराष्ट्राचा कानाकोपरा फिरणारे कोकणात (Konkan) उतरत होते. लाल डबा कोकणात कसा एकेकाला लाल लाल करत ते अनुभवत कुडाळमध्ये उतरलो.
तिथून रिक्षाने १७ किलोमीटरवर परूळ गाव आणि परूळ्याचा धक्का. वेळ संध्याकाळ ६ची. धक्क्यावर पोचल्यावर समोर हजारो रंग ओतून निसर्गाने मारलेले फटकारे. सगळा शीण त्या फटकाऱ्याने फाट्यावर मारून आम्हाला त्या पोट्रेटमध्ये वर निसर्गाने प्रवेश दिला. समोर देवबाग कर्ली नदी ती जेथे समुद्राला मिळते तो संगम. मस्त नदी आणि समुद्र एकमेकांवर ढुशी मारत होते.
आम्ही लॉंचमध्ये बसलो. समोर, ''सामंतांना'' लाभलेले वरदान दिसत होते. अख्ख्या डोंगरवर आंब्याची बाग आणि निसर्ग त्यांचे काहीतरी देणे असल्यासारखा. म्हणे, या सामंतांना नोव्हेंबरमध्येच अस्सल हापूस भरभरून देतो आणि पहिली पेटी १० ते २० हजार भाव खाऊन अमेरिकेत पोहोचते. सावकाश पलीकडे देवबाग बीच (Devbagh Beach) वर पोहोचलो. तिथून एका बाजूला सनसेट आणि आमची पायपीट. तेथून अर्ध्या किलोमीटरवर असलेल्या समीर तांडेलच्या घरात आलो आणि फक्त १०० फुटांवर संध्याकाळचा समुद्र मस्त लाटा उधळत किनाऱ्यावर आपली मस्ती दाखवत येतोस का माझ्यासोबत? तुला ओपन ऑफर देतो. आलास सोबत तर अख्खी दौलत तुझी! असे मस्त लाटातून सांगत होता.
िट्रपचे उद्दिष्ट स्कुबा डायव्हिंग असल्याने बाकी फिरायला गेलो नाही. मस्त रात्री सौंदाली सोलकढी असे समुद्री जेवण केले. जळगाव, नांदेड, नागपूरवाले कोकण काय चीज आहे, हे भरभरून अनुभवत होते. दुसऱ्या दिवशी सकाळी ८.३०ला यशवंत आला. हा, आम्हाला आता पुढे गाईड करणार होता. ''सारंग कुलकर्णी'' नावाच्या एक समुद्रवेड्या तरुणाने सगळ्यात पहिल्यांदा भारतात अंदमान-निकोबार बेटानंतर अतिशय विस्तृत स्वरूपात कोरल रिफची दौलत सिंधुदुर्ग परिसरात असल्याचा शोध लावला. स्वतः सारंग हे मरिन जीवशास्त्रज्ञ आहेत आणि जगातील नामवंत स्कुबा डायव्हिंगमधील तज्ज्ञ आहेत. त्यांनी मालवण परिसरात शोध लावल्यावर तेवढ्यावरच ते थांबले नाहीत तर तेथील तरुणांना त्यांनी एकत्र केले.
तरुण मच्छीमारी करणारे जेमतेम दहावीपर्यंत गेलेले; पण सगळ्या परिसराची इंच इंच माहिती असणारे. व्यवस्थित स्कुबा डायव्हिंगचे त्यांना प्रशिक्षण दिले. सोबत स्नॉर्क्लिंगचे पण दिले. स्कुबा डायव्हिंग म्हणजे तुम्ही तोंडावाटे हवा घेऊन समुद्रात तळाशी जाऊन खालील सौंदर्य बघणे तर स्नॉर्क्लिंग म्हणजे समुद्राच्या पाण्यात डोके खुपसून तळातील सौंदर्य पाहणे; पण खरी मजा स्कुबा डायव्हिंगमध्ये आहे. तुम्हाला सिंधुदुर्ग आणि देवबागमध्ये या दोनही गोष्टी बघायला मिळतात; पण देवबागमधील टीम ही थोडी महागडी असली तरी ती तुम्हाला सिंधुदुर्ग किल्ल्यापासून दूर खोल समुद्रात घेऊन जाते आणि जास्त वेळ देतात.
यशवंतने आम्हाला अशा जागी आणले की, तिथून सिंधुदुर्ग किल्ला दिवाळीच्या किल्ल्याएवढा दिसतो आणि आपण समुद्राच्या मध्यभागात. यशवंतने आम्हाला प्राथमिक ट्रेनिंग दिले. अंगठा वर केला की, मला अस्वस्थ वाटत आहे. वर घेऊन चल, अंगठा खाली केला की, मी आता ओके आहे पुन्हा मला खाली घेऊन चल आणि छान छान असे हाताने दाखवले की, आपण समुद्रसफारी एन्जोय करतोय, अशा खुणा.
सोबत दोन गाईड असतात. एक तुम्हाला खाली तळाशी घेऊन हात धरून समुद्रीसंपत्ती दाखवतो आणि एकजण समुद्राच्या पृष्ठभागावर हातात सुरक्षाट्यूब घेऊन पोहत असतो. तुम्ही वर येताना दोन्ही हात ताठ करून त्या ट्यूबमधून बाहेर काढायचे आणि दम खायचा. मला यशवंतने श्वास घ्यायला शिकवले आणि मी हळूच समुद्रात डोकं खुपसले आणि एका मिनिटात डोके बाहेर काढले. माझी तंतरली होती. वर वर सोपे वाटणारे तोंडाने श्वास घ्यायचा प्रकार लय अवघड होता भाऊ! मी पुन्हा दम खाऊन जर खाली जायला बघितले आणि हाशहुश करत पुन्हा बाहेर आलो आणि चोख त्याला सांगितलं, आपल्याला जमणार नाही. मला पुन्हा बोटीत सोड; पण त्याला या प्रकारची सवय असावी. त्याने मला धीर दिला.
मला सांगितले, तुम्ही आयुष्यात बिननाकाचे जन्माला आला आहात आणि तोंड हेच नाक, असे समजून श्वास घ्या आणि हेच आपले जीवन असे समजून एक मासा व्हा आणि शांतपणे माझ्याबरोबर चला. मी मासा झालो. तोंड माशाचे कल्ले झाले आणि यशवंतच्या हातात माझ्या आयुष्याची दोरी देऊन त्याच्या साथीने खोल समुद्रात शिरलो. हळू एकेक फूट तळाशी जात होतो आणि जाणवले पाठीवर पाच किलोची लॅपटॉपची बॅग असली की, कधी एकदा उतरवतो असे होते आणि इथे मी अक्खी जगातील सर्वात मोठी पाण्याची टाकी घेऊन फिरत होतो. थोडे कानावर पण दाब येतो. दुखतात; पण हळूहळू सवय होते आणि यशवंतने मला समुद्र काय काय लपवून आहे ते दाखवले. समुद्री फुले, समुद्री काकडी, काटेरी मासे निमो, हजारो रंगाचे मासे.
कदाचित आता ते यशवंतला ओळखू लागले असतील. हा आला की, आपल्याला खाणे मिळते कोठून कोठून. मासे अंगावर येत होते. ए मला पण बघ. ए माझी साडी बघ ए जाड्या माझा टी शर्ट बघ. अरे बापरे बाप, हा बघ कोणीतरी खडूस माझ्याकडे बघतो. असंख्य प्रकार मला एक जाणवले. हळूहळू आपण जमिनीवर आलो त्यामुळे खालचे चेहरे ओळखीचे वाटू लागले. तेवढ्यात यशवंतने हात सोडला आणि कॅमेरा काढला, मग मस्त पोझ दिल्या आणि फोटोसेशन झाले.
लोक गोव्यात जातात आणि पी पी पितात; पण तेथून थोड्या अंतरावर असलेला निसर्ग प्यायला विसरतात. त्यासाठी मुंबई-गोवा महामार्ग पकडायचा आणि मालवण गाठायचे; पण मालवणात मुक्काम करण्यापेक्षा देवबागला मुक्काम करा. तुम्ही समुद्राच्या खांद्यावर डोके खुपसून असता आणि जाताना शिवराय आणि हिरोजी इंदुलकर यांचा निसर्गाच्या छातीवर मस्त कोरलेला, सिंधुर्दुग बघायला विसरू नका. आपण शिवराय जिथे जन्माला आले, वाढले, स्वराज्य निर्माण केले त्या साक्षात शिवराज्यात शिवाला स्पर्श करत आहोत, ही भावनाच तुम्हाला मोहवून टाकते आणि आपली महाराष्ट्रीयन लोकांची हीच संपत्ती अनुभवा.
(लेखक दऱ्याखोऱ्यांतून भटकंती करणारा सामाजिक कार्यकर्ता आहे.)
Historical Temple : एका मंदिरात देवांच शरीर अन् दुसरीकडे आहे मुख, तुम्ही हे अनोखं मंदिर पाहीलंय का?
Historical Temple :
आपल्या देशाला मंदिरांचा देश म्हटले जाते. कारण आपल्या देशात अति प्राचिन अशा अनेक मंदिराचा खजाना आहे. वेरूळमधील लेणी, प्रसिद्ध असे ६४ योगिनींचे मंदिर यांना पाहून त्यांची प्रचिती येते.
आपल्याकडे केवळ प्राचिनच नाहीतर आश्चर्यचकीत करणारीही अनेक मंदिरे आहेत. कर्नाटकातील एका मंदिरातील नंदीची मूर्ती आकाराने वाढत आहे. तर, कोल्हापुरच्या खिद्रापूरच्या मंदिरात शिवलिंग अन् त्याचा नंदी दुसऱ्या राज्यात आहे.
अशी अनेक मंदिरे अन् त्यांच्या पौराणिक कथा आपल्या देशात आहेत. ज्यांना कानोसा घेतला तर विज्ञानही त्याच्या तथ्यापुढे फिके पडते. अशाच पद्धतीच्या एका मंदिराची माहिती आज आपण पाहुयात. ज्या मंदिरात केवळ धड आहे तर त्याचे शीर दुसऱ्याच मंदिरात आहे.
भारताची देवभूमी असलेल्या उत्तराखंडमध्ये अशी अनेक प्राचीन मंदिरे आहेत, ज्यांचा इतिहास आश्चर्यचकित करतो. अल्मोडा जिल्ह्यात असेच एक मंदिर आहे, जिथे देवाच्या धडाची पूजा केली जाते. हे शहरापासून सुमारे 20 किलोमीटर अंतरावर गरड येथे आहे. या मंदिराला कालबिष्ट गरड गोलू देवतेचे मंदिर म्हटले जाते.

गरड गोलू देवाला कल्याण सिंह बिष्ट असेही म्हणतात. या मंदिरात येणाऱ्या भाविकांच्या मनोकामनाही पूर्ण होतात. गरड गोलू यांची फसवणूक करून हत्या करण्यात आली. पटिया गावातील चांद वंशी राजांचा दिवाण सम्राट पांडे उर्फ नौलख्खा पांडे याने गरड गोलू देवाला मारले होते.
गरड गोलू यांची बहीण देवकी हिचा पती लक्ष्मीसिंग बिष्ट याने त्यांची हत्या केली होती. स्थानिक लोकांचे म्हणणे आहे की, गरड गोलू हे गायी चारणारे गोपाळ होते. आणि तो त्यांच्या गायी,म्हैशी चारण्यासाठी जंगलात घेऊन गेले होते.
तेव्हा फसवून त्यांची हत्या करण्यात आली. त्याचे धड याच ठिकाणी राहिले तर त्याचे डोके अडीच किलोमीटर अंतरावर पडले. त्यामुळे गोलू यांच्या धडासह त्याच्या गायी,म्हैशींनीही दगडाचे रूप धारण केलं.
विविध राज्यातून भाविक या मंदिरात पोहोचतात. त्यांची इच्छा पूर्ण झाल्यावर ते येथे येऊन दर्शन घेतात. तसेच, भंडाऱ्याचा उत्सव आयोजित केला जातो. मंदिराचे पुजारी सांगतात की, येथे परमेश्वराच्या धडाची पूजा केली जाते.
उत्तराखंडच्या विविध जिल्ह्यांसह अन्य राज्यांतूनही येथे भाविक येतात. गरड गोलू देवता यांना न्यायदेवता मानले जाते. येथे येणाऱ्या भाविकांच्या मनोकामना पूर्ण होतात. मनोकामना पूर्ण झाल्यावर भाविक येथे बेल, फळ, फुले आणि नारळ अर्पण करतात.
या मंदिराला प्राचिन महत्त्व आहे. येथे येण्याने मनोकामना पूर्ण होतात आणि मानसिक शांती मिळते. अनेक भक्त इथे नियमित हजेरी लावतात.

पृथ्वीवर अवतरणार स्वर्ग! काश्मीरमध्ये सुरू होणार ट्यूलिप फेस्टिव्हल.. असणार विविध रंगांची 15 लाख फुलं
काश्मीर अनेक सुंदर ठिकाणांसाठी ओळखले जाते, परंतु येथील सर्वात प्रेक्षणीय आकर्षण म्हणजे ट्युलिप गार्डन. काश्मीरमध्ये नवीन पर्यटन हंगाम सुरू झाल्यामुळे आशियातील सर्वात मोठे ट्यूलिप गार्डन 19 मार्चपासून पर्यटकांसाठी खुले करण्यात येणार आहे. दल सरोवराच्या काठावर वसलेली ही बाग वेगळीच आहे. 2021 मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लोकांना या बागेला भेट देण्याचा सल्ला दिला होता.
यंदाही पर्यटन हंगाम सुरू होताच लोक जम्मू-काश्मीरला पोहोचू लागले आहेत. हे ट्युलिप गार्डन 19 मार्च ते 20 एप्रिल पर्यंत खुले असणार आहे. आम्ही तुम्हाला या ठिकाणाशी संबंधित माहिती देखील देऊ, जसे की तुम्ही येथे कोणती फुले पाहू शकाल, तुम्ही येथे कसे पोहोचू शकता आणि बागेच्या आजूबाजूला काय पाहू शकता.
या बागेत 15 लाखांहून अधिक ट्यूलिप आहेत -
आशियातील सर्वात मोठे ट्यूलिप गार्डन जबरवान पर्वतराजीच्या कुशीत वसलेले आहे. या बागेत 60 प्रकारच्या प्रजाती आणि 15 लाखांहून अधिक रंगीत ट्यूलिप्स आहेत. अशा रंगीबेरंगी फुलांमुळे इंदिरा गांधी मेमोरियल ट्युलिप गार्डन हे आता श्रीनगरच्या प्रमुख पर्यटन आकर्षणांपैकी एक बनले आहे
पर्यटकांची संख्या वाढत आहे -
दरवर्षी उद्यान सुरू झाल्यानंतर पहिल्याच दिवशी स्थानिक नागरिक आणि पर्यटकांची मोठी गर्दी असते. येथे अनेक सांस्कृतिक आणि संगीताचे कार्यक्रमही आयोजित करण्यात येते. ट्यूलिप्स व्यतिरिक्त, फुलांच्या इतर प्रजाती देखील येथे उगवल्या जातात, जसे की - डॅफोडिल्स, जलकुंभी आणि रॅननक्युलस.
बाग फक्त एक महिन्यासाठी खुली असणार-
या बागेला भेट द्यायची असेल तर लक्षात ठेवा की ही बाग वर्षभर उघडली जात नाही. हे फक्त 1 महिन्यासाठी उघडले जाईल, म्हणून तुम्ही हे सौंदर्य पाहण्यासाठी लवकरात लवकर नियोजन करा. येथे प्रवेश शुल्क प्रौढांसाठी 50 रुपये आणि लहान मुलांसाठी 25 रुपये आहे, ज्याला तुम्ही सकाळी 7 ते संध्याकाळी 7:30 दरम्यान कधीही भेट देऊ शकता.
श्रीनगरमधील पाहण्यासारखी ठिकाणे -
आता जर तुम्ही श्रीनगरला जाणार असाल तर ट्यूलिप गार्डन बघण्यासोबतच तुम्ही सुंदर दल सरोवर, शालीमार बाग, निशात बाग, चष्मे शाही, परी महल, शंकराचार्य मंदिर, हरी परबत, बारामुल्ला यांसारख्या ठिकाणांना भेट देऊ शकता. श्रीनगरला भेट देण्याचा सर्वोत्तम काळ म्हणजे मार्च ते ऑक्टोबर. या काळात इथे फारशी थंडी नसते आणि तुम्ही आरामात फिरू शकता.
Jaisalmer Travel : राजस्थानातील जैसलमेर शहरात फिरण्यासाठी आहेत ‘ही’ उत्तम ठिकाणे, एकदा नक्की द्या भेट
Jaisalmer Travel : राजस्थान हे राज्य तिथल्या अनेक ऐतिहासिक हवेलींसाठी आणि किल्ल्यांसाठी प्रसिद्ध आहे. या राज्यात अनेक पर्यटन स्थळे आहेत, जी तुम्ही कधीच मिस करता कामा नये. राजस्थानातील जैसलमेर या शहराला ‘गोल्डन सिटी’ म्हणून ओळखले जाते.
जर तुम्ही मित्र-मैत्रिणींसोबत किंवा कुटुंबासोबत कुठे फिरायला जाण्याचा विचार करत असाल तर राजस्थानमधील जैसलमेर हे शहर बेस्ट पर्याय ठरू शकतो. या शहरात पाहण्यासारखी अनेक ठिकाणे आहेत.
या शहरातील सुंदर राजवाडे, हवेली आणि ऐतिहासिक किल्ल्यांसोबतच येथील गजबजलेल्या बाजारपेठ्या तुमचे लक्ष वेधून घेतात. यासोबतच तुम्ही या शहरात डेझर्ट सफारीचा ही आनंद घेऊ शकता. आज आपण जैसलमेरमधील विविध पर्यटनस्थळांबद्दल जाणून घेणार आहोत.
जैसलमेर किल्ला
जैसलमेर शहरात हा किल्ला स्थित आहे. या किल्ल्याला 'सोनार किल्ला' म्हणून ही ओळखले जाते. आकाराने प्रचंड मोठा असलेला हा किल्ला शहराच्या कोणत्याही कोपऱ्यातून दिसतो. हा किल्ला या शहराचा जणू सुंदर मुकूट आहे.
हा किल्ला पाहण्यासाठी देश-विदेशातील लोक गर्दी करतात. विशेष म्हणजे युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळामध्ये या किल्ल्याचा समावेश आहे. जैसलमेरला गेल्यावर या किल्ल्याला भेट द्यायला अजिबात विसरू नका. (Jaisalmer Fort)
गडीसर तलाव
जैसलमेर किल्ल्याजवळ असणारे हे पर्यटन स्थळ लोकांमध्ये विशेष लोकप्रिय आहे. या तलावाला प्राचीन इतिहास लाभला आहे. या गडीसर तलावाची निर्मिती राजा रावल जैसलने इ.स.११५६ मध्ये केली होती. त्यानंतर, १३६७ च्या आसपास या तलावाची पुन्हा डागडुजी करण्यात आली.
विशेष म्हणजे या सुंदर तलावाच्या चार ही बाजूंना वैशिष्ट्यपूर्ण मंदिरे आणि नक्षीदार घुमट आहेत. जर तुम्हाला निवांत वेळ घालवायचा असेल तर त्यासाठी हे ठिकाण बेस्ट आहे. या तलावात तुम्ही बोटिंग देखील करू शकता. शांततेसाठी हे ठिकाण सर्वोत्तम आहे. (Gadisar Lake)
पटवों की हवेली
जैसलमेर शहरातील आणखी एक लोकप्रिय ठिकाण म्हणून ‘पटवों की हवेली’ प्रसिद्ध आहे. या भव्य हवेलीचे सुंदर नक्षीकाम आणि हवेलीचा सोनेरी रंग तुमचे लक्ष वेधून घेतो. ही हवेली पाहताना आपण जणू एखाद्या सुवर्ण महालात फिरत असल्याचा आपल्याला भास होतो.
इतकी ही हवेली सुंदर आहे. इतिहासप्रेमींसाठी तर हे ठिकाण सर्वोत्तम आहे. ही हवेली १८०५ मध्ये याच शहरातील प्रमुख व्यापारी गुमान चंद यांनी बांधली होती. (Patwon Ki Haveli)
Snowboarding In India : भारतातही घेता येईल स्नोबोर्डिंगचा आनंद; या ठिकाणांना नक्की द्या भेट
जेव्हा थंड हवामान येते तेव्हा आपल्या सर्वांना बर्फामध्ये खेळायचे असते. साधारणपणे, या ऋतूमध्ये लोक बर्फवृष्टी असलेल्या ठिकाणी जाण्याचा विचार करतात. त्यांना फक्त बर्फातच खेळायचे नाही तर या हंगामाचा पुरेपूर आनंद घेण्यासाठी विविध अॅडवेंचर्स अॅक्टिव्हिटीजचा भाग व्हायचे आहे. अशीच एक अॅक्टिव्हिटी म्हणजे स्नोबोर्डिंग.
भारतात अशी अनेक अद्भुत ठिकाणे आहेत जी जवळजवळ संपूर्ण हिवाळ्यात बर्फाने झाकलेली असतात. अशा परिस्थितीत, तुम्ही येथे स्नोबोर्डिंग आणि स्कीइंगसारख्या अॅक्टिव्हिटीजचा आनंद घेऊ शकता. तर, आज आम्ही तुम्हाला अशाच काही ठिकाणांबद्दल सांगत आहोत, जिथे तुम्ही स्नोबोर्डिंगचा आनंद घेऊ शकता आणि तुमचा हिवाळा खूप खास आणि संस्मरणीय बनवू शकता.
गुलमर्ग
जेव्हा स्नोबोर्डिंगचा विचार केला जातो, तेव्हा जम्मू-काश्मीरमधील गुलमर्गचे नाव नक्कीच प्रथम मनात येते. हे शहर आशियातील सर्वोत्तम स्नोबोर्डिंग ठिकाणांपैकी एक आहे. येथे सरासरी वार्षिक बर्फवृष्टी सुमारे 45 फूट आहे. या ठिकाणाची आणखी एक खास गोष्ट म्हणजे तुम्ही बिगनर असोत किंवा स्नोबोर्डिंग चॅम्पियन असाल तरीही सर्व लेव्हलच्या लोकांसाठी येथे विविध प्रकारचे उतार आहेत. आपण येथे सर्व प्रकारचे उतार आणि ट्रॅक शोधू शकता. स्नोबोर्डिंगचे शौकीन युरोपियन आणि उत्तर अमेरिकन देशांतूनही गुलमर्ग येथे येतात.
पहलगाम
पहलगाम हे सर्वोत्तम ठिकाणांपैकी एक आहे. दरवर्षी मोठ्या संख्येने पर्यटक येथे भेट देण्यासाठी येतात. हा एक भाग आहे जो हिवाळ्यात बर्फाने झाकलेला असतो. पहलगाम हे स्नोबोर्डिंग आणि व्हाईट वॉटर राफ्टिंगसाठी ओळखले जाते. जर तुम्हाला हिवाळ्यात काही अॅडवेंचर्स अॅक्टिव्हिटीजचा आनंद घ्यायचा असेल तर तुम्ही पहलगाममध्ये स्नोबोर्डिंग करू शकता. येथे भेट देण्याचा सर्वोत्तम काळ फेब्रुवारीपर्यंत मानला जातो.
रोहतांग
स्नोबोर्डिंगचा विचार केल्यास रोहतांग हे एक उत्तम ठिकाण आहे. मनालीजवळील रोहतांग हे बर्फाच्छादित पर्वत आणि दऱ्यांसाठी खूप प्रसिद्ध आहे. लोक येथे स्कीइंग आणि पॅराग्लायडिंगसारख्या अॅडवेंचर्स स्पोर्ट्सचाही आनंद घेतात. हे भारतातील स्नोबोर्डिंगसाठी सर्वोत्तम ठिकाणांपैकी एक आहे. जरी तुम्ही बिगनर असाल, तरीही तुम्ही येथे स्नोबोर्डिंग करू शकता.
सोलंग व्हॅली
सोलंग व्हॅलीला सोलंग नाला असेही म्हणतात. हे असे ठिकाण आहे जिथे लोकांना हिवाळ्यात यायला आवडते. विंटर स्पोर्ट्स हॉटस्पॉट म्हणून याकडे पाहिले जाते. हे मनालीपासून अवघ्या 12 किमी अंतरावर आहे. थंड हवामान, बर्फाच्छादित दृश्ये हे ठिकाण देशाच्या विविध भागांतून येणाऱ्या पर्यटकांसाठी सर्वोत्तम ठिकाण आहे. सोलंग नाला येथे दर हिवाळ्यात एक स्की महोत्सव देखील आयोजित केला जातो ज्यात जगातील विविध भागांतील पर्यटक सहभागी होतात. जर तुम्हाला स्कीइंग किंवा स्नोबोर्डिंगची आवड असेल तर तुम्ही सोलांग व्हॅलीला भेट दिलीच पाहिजे.
Gujarat Travel : गुजरातमधील या सर्वात सुंदर आणि प्रसिद्ध पर्यटन स्थळांना नक्की भेट द्या!
भारताच्या पश्चिमेस वसलेले गुजरात हे देशाचे एक प्रमुख राज्य आहे. तसेच ते एक लोकप्रिय पर्यटन राज्य देखील आहे. गुजरात हे भारतातील सुंदर राज्यांपैकी एक आहे. गुजरातमधील संस्कृती, समृद्ध वारसा, नैसर्गिक लँडस्केप आणि स्वादिष्ट पाककृती पर्यटकांना आकर्षित करते.
आपल्या सांस्कृतिक ओळखीबरोबरच, गुजरातला त्याच्या अनेक ऐतिहासिक आणि अद्भुत ठिकाणांसाठी देखील एक अतिशय लोकप्रिय राज्य मानले जाते. या राज्यात अशी अनेक न पाहिलेली ठिकाणे आहेत, जी आजही पर्यटकांच्या नजरेपासून दूर आहेत.
गुजरातमधील ढोलेरा हे एक ठिकाण आहे जे खूप सुंदर आहे. आम्ही तुम्हाला ढोलेरातील काही सुंदर ठिकाणांबद्दल सांगणार आहोत.
ढोलेरा तलाव
ढोलेराला भेट द्यायची झाल्यास 'ढोलेरा लेक'चे नाव नक्कीच प्रथम घेतले जाते. ढोलेरा लेक वर्षभर पर्यटकांना आकर्षित करतो. खंभातच्या खाडीजवळ असल्याने ढोलेरा लेकचे सौंदर्य आणखीनच वाढते.
'ढोलेरा लेक'सोबतच त्याचे परिसरही पक्ष्यांचे माहेरघर मानले जाते. येथे तुम्हाला स्थलांतरित पक्षीही पाहायला मिळतात.
ढोलेरा धाम
ढोलेरा धाम हे केवळ ढोलेरा किंवा गुजरातचेच नव्हे तर संपूर्ण भारताचे प्रमुख धार्मिक स्थळ मानले जाते.
ढोलेरा धाममध्ये स्थापित स्वामीनारायणाची मूर्ती भाविकांसह पर्यटकांनाही आकर्षित करते. ढोलेरा धामची केवळ मूर्तीच नाही तर मंदिराची रचनाही पर्यटकांना खूप आवडते. मंदिराच्या भिंतींवर अनेक प्रकारच्या उत्कृष्ट कलाकृती पाहायला मिळतात.
ढोलेरा स्मार्ट सिटी
ढोलेरा स्मार्ट सिटी देखील पर्यटकांना मोठ्या प्रमाणात आकर्षित करणार आहे. हे स्मार्ट सिटी असल्याने येथे पर्यटक मोठ्या संख्येने पोहोचतील, असे बोलले जात आहे.
वृत्तानुसार, ढोलेरा स्मार्ट सिटी सुमारे 920 चौरस किलोमीटर परिसरात पसरली आहे. स्मार्ट सिटीप्रमाणे मोठमोठ्या इमारतींबरोबरच उद्याने, क्रीडांगणे, तलावही बांधले जात आहेत. ढोलेरा विमानतळही बांधण्यात येणार असल्याची बातमी आहे.
ही ठिकाणे देखील एक्सप्लोर करा
ढोलेरामध्ये इतरही अनेक ठिकाणे आहेत जिथे तुम्ही फिरू शकता. श्री सहजानंद स्वामी अक्षर ओरदी, श्री गोवर्धननाथजी हवेली आणि ढोलेरा जुम्मा मस्जिद देखील पाहू शकता.
Indian Islands Travel : केवळ लक्षद्वीपच नाही तर भारतातील ‘ही’ बेटे पर्यटनासाठी आहेत खास, नक्की द्या भेट
Indian Islands Travel : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी गुरूवारी संसदेत देशाचा अर्थसंकल्प सादर केला. या अर्थसंकल्पात भारतीय पर्यटनाला चालना देण्यासाठी पर्यटनाशी संबंधित काही महत्वाच्या घोषणा करण्यात आल्या. ज्यामध्ये पर्यटनासाठी लक्षद्वीपच्या पायाभूत सुविधांमध्ये सुधारणा करण्यासाठी केंद्र सरकार मदत करणार आहे.
हा अंतरिम अर्थसंकल्प सादर करताना सीतारामन यांनी प्रवासाला चालना देण्यासाठी पर्यटन क्षेत्रात गुंतवणूक करण्याची घोषणा केली. मालदीवसोबतच्या वादानंतर अनेक भारतीय मालदीवच्या ऐवजी आता लक्षद्वीपला फिरायला जात आहेत. त्यामुळे, आता लक्षद्वीपचा विकास करण्यावर केंद्र सरकार भर देणार आहे.
परंतु, केवळ लक्षद्वीपला फिरायला जाण्याऐवजी तुम्ही भारतातील इतर बेटांना ही भेट देऊ शकता. ही बेटे देखील निसर्गसौंदर्याने संपन्न आहेत. चला तर मग जाणून घेऊयात भारतातील काही बेटांबद्दल ज्या ठिकाणी तुम्ही एकदा तरी फिरायला जायलाच हवे.
अंदमान-निकोबार
अंदमान आणि निकोबार हा भारताचा केंद्रशासित प्रदेश आहे. हा केंद्रशासित प्रदेश निसर्गसंपन्न असून भारताच्या दक्षिण भागात हे सुंदर बेट स्थित आहे. येथील नयनरम्य समुद्रकिनारे आणि निसर्गसंपन्न प्रदेश आपले मन जिंकून घेतो. हे एक उत्तम पर्यटन स्थळ असून येथे दरवर्षी अनेक पर्यटक भेट देतात.
अंदमान आणि निकोबारमध्ये तुम्ही ट्रेकिंग, जेट स्की रायडिंग, स्कूबा डायव्हिंग, सीकार्ट, गेम फिशिंग इत्यादी साहसी वॉटर स्पोर्ट्सचा आनंद घेऊ शकता. या व्यतिरिक्त तुम्ही येथील स्ट्रीट फूड्सचा ही आस्वाद घेऊ शकता.
दीव-दमण
भारताच्या पश्चिम भागात स्थित असलेले दीव-दमण हा भारताचा केंद्रशासित प्रदेश आहे. दीव हे बेट फिरण्यासाठी एकदम बेस्ट आहे. येथील नयनरम्य समुद्रकिनारे तुमचे मन जिंकून घेतात. पोर्तुगीज संस्कृतीचे दर्शन घडवणाऱ्या येथील वास्तू तुम्हाला दीवच्या इतिहासाची साक्ष देतात.
येथील समुद्रकिनाऱ्यांसोबत, चर्च ऑफ सेंट पॉल ते १६ व्या शतकातील किल्ल्यांपर्यंत फिरण्यासाठी तुम्हाला या बेटावर भरपूर काही आहे. येथील ऐतिहासिक वारसा पाहण्याव्यतिरिक्त तुम्ही हॉट एअर बलून राईड, पॅराग्लायडिंग, स्कूबा डायव्हिंग, डॉल्फिन ट्रिप आणि पॅरासेलिंग इत्यादी साहसी खेळांचा ही आनंद तुम्ही घेऊ शकता.
एलिफंटा बेट
अरबी समुद्रात स्थित असलेले हे बेट पर्यटकांच्या आवडीचे आहे. येथे अनेक देशी-विदेशी पर्यटक भेट देतात. विशेष म्हणजे या बेटावरील एलिफंटा गुहा जगप्रसिद्ध असून त्यांचा समावेश युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळांमध्ये समाविष्ट करण्यात आला आहे.
मुंबईच्या समुद्रकिनाऱ्यापासून १० किमी अंतरावर हे बेट स्थित आहे. भगवान महादेवाला समर्पित असलेल्या या गुहा बेटाचे प्रमुख आकर्षण आहे. या एलिफंटा गुहांच्या आतमध्ये करण्यात आलेले कोरीव शिल्पकाम पाहण्यासारखे आहे.
महाबळेश्वरच्या पठारावर आखराचा गालिचा; चार वर्षांनी फुलांना बहर, 'आखरा'ची काय आहेत वैशिष्ट्ये?
सध्या महाबळेश्वरच्या पठारावर (Mahabaleshwar Plateau) आखराची फुले मोठ्या प्रमाणावर आल्याने पठार आखराच्या फुलांमुळे आकर्षक दिसत आहे.
महाबळेश्वर : दर चार वर्षांनी फुलणाऱ्या कारवी या जातीच्या प्रकारातील ‘आखरा’ या वनस्पतीला फुले येऊ लागली असून, पांढरट आखराच्या फुलांनी येथील पठार फुलून गेले आहे. या वनस्पतीचे वनस्पती शास्त्रातील नाव ‘लेपिडोग्याथास कुस्तीडाटा’(Lepidagathis cuspidata) असे आहे. या वनस्पतीची फुले पांढऱ्या रंगाची छोटी छोटी असून, २०-२५ टोकदार पानांच्या झुपाक्यावर ती येतात. मधमाशांच्या परागीभवनासाठी व आतील औषधी मधामुळे या प्रकारच्या फुलोऱ्याला विशेष महत्त्व आहे.
गवतासारखी ही वनस्पती रस्त्याच्या कडेला, जंगलात जमिनीलगत वाढलेली असते. श्रब (वेली) प्रकारात ही वनस्पती मोडते. सध्या महाबळेश्वरच्या पठारावर (Mahabaleshwar Plateau) आखराची फुले मोठ्या प्रमाणावर आल्याने पठार आखराच्या फुलांमुळे आकर्षक दिसत आहे.
-वसंतराव पाटील, सेवानिवृत्त संचालक, महाबळेश्वर मध संचालनालय
आखराची वैशिष्ट्ये
फुले साधारण अर्धा इंच लांब.
पांढऱ्या रंगाची फुले असून एक पाकळी थोडी लांब, तर दुसरी तुलनात्मक कमी लांब असते.
फुलाच्या आत परागकण असून, तेथेच मध साठलेला असतो.
फुलाचा मादक व मोहक वास मधमाशांना आकर्षून घेतो.
फुलातील मध गोळा करताना आतील परागकण मधमाशांच्या पायाला चिकटतात.
आखराच्या वनस्पतीची पाने छोटी; पण लांबट टोकदार.
सुमारे २५-३० पानांच्या तीन ते चार इंच लांबीच्या झुबक्यावर ही फुले येतात.
अन्य काळात ही वनस्पती गाई, म्हशी जनावरांना चारा म्हणून उपयोगी.
डिसेंबरमध्ये सुरू झालेला या वनस्पतीचा फुलोरा मार्चपर्यंत कमी अधिक प्रमाणात.
अशी आहे स्थिती
कारवी वनस्पतींचे प्रामुख्याने चार प्रकार.
सात वर्षांनी फुलणारी कारवी, व्हायटी.
कारवीच्या प्रकारातही दर सात वर्षांनीच फुले.
आखरा प्रकारात दर चार वर्षांनी फुले.
खरवर प्रकारात दर सोळा वर्षांनी फुले.
प्रत्येक हंगामात येणाऱ्या फुलोऱ्याच्या वेळी मधमाशा.
सध्या आखरा जातीच्या कारवी फुलांचा हंगाम सुरू.
या काळात जमा होणारा मध आखराच मध म्हणून ओळखला जातो.
कारवीच्या सर्वच जातीचा मध औषधी.
National Tourism Day : दुर्लक्षित वारसास्थळे
- ९९२२९९४३१४
शहर व जिल्ह्यात अनेक पर्यटनस्थळे आहेत जिथे पर्यटक जाऊ शकतात. मात्र, तिथे पर्यटन विभाग, पुरातत्त्व विभाग आणि स्थानिक प्रशासनाकडून दुर्लक्ष करण्यात आल्याने ही पर्यटनस्थळे, वारसास्थळे पर्यटकांच्या नजरेआड आहेत. या नजरेआड असलेल्या या वारसास्थळांचे मार्केटिंग केले तर पर्यटनवाढीसाठी निश्चितच आणखी चालना मिळेल यात शंका नाही.
शहरानजीकचे बुद्ध लेणीसमूह
छत्रपती संभाजीनगर शहरात उत्तरेला सोनेरी महालापासून जवळच आहेत बौद्धकालीन लेण्या. या लेण्यांचा सातव्या शतकाच्या मध्यकाळातील कालखंड तर काही संशोधकांच्या मते पाचवे शतकाचा उत्तरार्ध ते सहाव्या शतकाची सुरुवात सांगितला जातो. संशोधकांची कालखंडविषयक वेगवेगळी मते आहेत.
बदामी चालुक्यांचा काळात अर्थात सहाव्या शतकात ही लेणी खोदली असावी. या लेण्यांमध्ये थेरवादी, महायानी आणि वज्रयाणी अशा बुद्धधम्मातील तीनही विचारधारांचे प्रतिबिंब इथल्या लेण्यांमध्ये आहे. महाविहाराकडील बाजूने आणि हनुमान टेकडीकडील बाजूने असे दोन लेणीसमूह इथे आहेत.
सोनेरी महाल
औरंगजेब बादशहासोबत आलेल्या बुंदेलखंडातील सरदार पहाडसिंगाने बांधलेला सोनेरी महाल. सोनेरी महालाची वास्तू दोन मजली आहे. वरती जाण्यासाठी दक्षिणोत्तर भागात जिने आहेत. सर्वांत वर गच्चीवर टेहळणी मनोरा आहे. इमारतीस भव्य संतुलित नक्षीदार कमानी, कमानीतून उत्तम प्रकारची प्रकाशयोजना व मध्यभागी मुख्य वास्तू अशी रचना केली आहे. सोनेरी महाल हे राजपूत व मुघल यांच्या संमिश्र स्थापत्य शैलीचे उत्कृष्ट असे उदाहरण आहे.

महालाच्या दरबार सभागृहामध्ये सोनेरी रंगाच्या ठिकाणी खऱ्या सोन्याचे पाणी वापरून नक्षी काढण्यात आली. त्यामुळे सोनेरी महल असे म्हटले जाते. काळाच्या ओघात येथील चित्रे अंशत: नष्ट झाली. वास्तूच्या पहिल्या मजल्यावर असलेले प्रादेशिक वस्तुसंग्रहालय १९७९ मध्ये स्थापन करण्यात आले. यात पुरातन कलावस्तूंचा संग्रह विविध दालनांमध्ये प्रदर्शित केला.
यात प्राचीन मूर्ती, चित्रे, दागिने, मातीची भांडी, शस्त्रे यासारख्या वस्तूंचा समावेश असून, पैठण व तेर उत्खननात प्राप्त भाजलेल्या मातीच्या कलावस्तू, लाकडी फळीवर व काचेवर रेखाटलेली चित्रे, मराठवाड्याच्या विविध भागांतून मिळालेली दगडी शिल्पे विशेष उल्लेखनीय आहेत. हे संग्रहालय सोमवार वगळता आठवड्याच्या अन्य दिवशी सकाळी साडेदहा ते सायंकाळी पाचपर्यंत प्रेक्षकांसाठी खुले असते.
लाला हरदौल चबुतरा
सोनेरी महालाच्या समोरच लाला हरदौल यांची समाधी आहे. हे पहाडसिंग यांचे भाऊ होते. लाला हरदौल बुंदेल खंडातील महान सेनानी व कुशल योद्धा म्हणून परिचित आहेत. त्यांची समाधी चौरस आकाराची आहे. या समाधी परिसरात एक पायऱ्यांची विहीर आहे. बुंदेलखंडाच्या इतिहासात त्यांच्या पराक्रमामुळे वेगळे स्थान आहे. आजही त्यांच्या शौर्याच्या कथा बुंदेलखंडात व इतरत्र प्रसिद्ध आहेत.
लाला हरदौल यांचे वाढते सामर्थ्य सहन न होऊन त्यांचे भाऊ झुंजारसिंह यांनी त्यांना विजयादशमीच्या दिवशी वर्ष १६३१ मध्ये विषप्रयोग करविला. त्यात त्यांचा मृत्यू झाला असा उल्लेख मिळतो. लाला हरदौल यांची स्मृती म्हणून त्यांच्या स्मरणार्थ बांधलेली ही नामसमाधी हरदौल चबुतरा म्हणून ओळखला जातो. या चबुतऱ्यावर देवनागरी व उर्दू लिपीत एक लेख कोरलेला असून, त्यात हरदौल असा उल्लेख आहे.
निपट निरंजन
निपट निरंजन बाबा मूळचे बुंदेलखंडचे. १६७३ मध्ये बाबा छत्रपती संभाजीनगरात आले. तपस्येनंतर ते गुरूच्या शोधात सूलिभंजनच्या डोंगरावर नाथपंथी संतांचा मेळा जमलेला होता, तिथे ते गेले. गोरक्षनाथांचे शिष्य चर्पटनाथ तिथं होते. गुरुपौर्णिमेनिमित्त एका कढईत प्रसाद शिजवणं सुरू होते. प्रसाद होता, कढईत टाकलेल्या गोम, विंचू, साप, सरडे, खेकडे, पालींचा. चर्पटनाथांनी शाबरी कवच म्हटले.
शिजवलेल्या या प्रसादावर जलसिंचन केले आणि संतांची पंगत बसली. प्रसाद वाटला जात होता. पण, हा असला विषारी प्रसाद खायचा तरी कसा? बाबांच्या मनात संशय आला. त्यांनी प्रसाद खाल्ला नाही. सगळे साधू प्रसाद खाऊन झाल्यावर महायोगी चर्पटनाथांनी निपटबाबांचं मन जाणलं. ‘तेरे हिस्से का जो बचा है, उसे निपट ले!’ गुरू आदेश झाला. मग बाबांनी कढईच्या तळाशी उरलेसुरलं निपटून खाल्लं आणि भावसमाधीत लीन झाले.
चर्पटनाथांच्या ‘निपट ले’ या आज्ञेचं या शिष्यानं पालन केलं आणि बाबांचं नाव ‘निपट महाराज’ पडलं. बाबा सिद्ध पुरुष झाले. औरंगजेब बादशहा खुलताबाद, दौलताबाद आणि छत्रपती संभाजीनगर भागातील सुफी संत आणि सिद्ध पुरुषांच्या खास भेटी घेत असे.
पहाडसिंगपुऱ्यात राहणाऱ्या निपट बाबांची महती त्याच्या कानावर गेली. बादशहानं या साधूची भेट घेतल्याचे उल्लेख आढळतात. डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ परिसरातील लेण्यांच्या पायथ्याशी त्यांची समाधी आहे.
पर्यटनासाठी योग्य, मात्र दुर्लक्षित पर्यटनस्थळे
शुलभंजन पर्वतावरील दत्त देवस्थान, संजीवन शिळा
शुलभंजन जवळील परियों का तालाब
मराठवाड्याचे महाबळेश्वर म्हैसमाळ
छत्रपती शिवाजी महाराज यांचे पूर्वज
मालोजीराजे भोसले यांची वेरूळ येथील गढी
मलिक अंबरकालीन नहरींचे व्यवस्थापन
पितळखोरा येथील लेण्या
जंजाळा येथील घटोत्कच लेणी
बेगमपुऱ्यातील थत्ते हौद
घाटनांद्रा येथील जोगेश्वरी
संत ज्ञानेश्वर माउलींचे जन्मस्थान आपेगाव
अंभई (ता. सिल्लोड) येथील वडेश्वर मंदिर
वेताळवाडी (ता. सिल्लोड) किल्ला
अंतूर किल्ला (ता. कन्नड)
Tourist Places in Ayodhya: अयोध्येतील राम मंदिराजवळ आहेत आणखीही बरीच पर्यटन स्थळं, एका दिवसात होतील पाहून; जाणून घ्या
आज 22 जानेवारी रोजी अयोध्येत रामलल्लाची प्राणप्रतिष्ठा होणार असून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते मंदिराचे उद्घाटन होणार आहे. या सोहळ्यात सहभागी होण्यासाठी देशभरातील जवळपास सात हजार लोकांना आमंत्रण देण्यात आले आहे.
यानंतर अयोध्येत येण्याची तयारी अनेक लोकांनी केली आहे. राम मंदिर भक्तांना दर्शनासाठी 23 जानेवारीपासून खुले होणार आहे. लोकांच्या मनात भव्य राम मंदिर पाहण्यासाठी उत्सूकता दिसत आहे. अयोध्येत राम मंदिरासह, इतरही सुंदर ठिकाणे आहेत ज्यांना तुम्ही भेट द्यायलाच हवी. एका दिवसात ही सुंदर ठिकाणं पाहून होतील.
राम की पैडी
शरयू नदीच्या काठावर वसलेल्या 'राम की पैडी' येथे लाखो दिवे प्रज्वलित होत असताना दिवाळीत मोठा दीपोत्सव आणि लेझर लाइट शो तुम्ही टीव्हीवर पाहिला असेल. हे अयोध्येतील घाटांचे एक समूह आहेत, जेथे भक्त स्नान करतात.
नागेश्वर नाथ मंदिर
आपण राम की पैडी येथील नागेश्वर नाथ मंदिराला भेट देऊ शकता, असे मानले जाते की ते प्रभू रामाचे पुत्र कुश याने बांधले होते. शरयू नदीत आंघोळ करताना कुशचे बाजूबंद हरवले तेव्हा ते नागकन्याला सापडले, कारण ती मुलगी शिवभक्त होती, म्हणून कुशने येथे मंदिर बांधले होते.
कनक भवन
अयोध्येच्या रामकोटमध्ये बनवलेले कनक भवन या प्राचीन शहराच्या सर्वात सुंदर इमारतींपैकी एक आहे, असे म्हटले जाते की राणी कैकेयीने ही इमारत सीता मातेला तिच्या लग्नानंतर भेट म्हणून दिली होती.
जैन श्वेतांबर मंदिर
तुम्ही अयोध्येत आलात तर जैन श्वेतांबर मंदिरालाही भेट देऊ शकता. जैन धर्मातील अनेक तीर्थंकरांचा जन्म येथे झाला, म्हणूनच या धर्माच्या अनुयायांसाठी हे पवित्र स्थान आहे.
गुप्तर घाट
हा घाट शरयू नदीच्या काठावर आहे ज्याला घग्गर घाट असेही म्हणतात. फैजाबादजवळील हे प्रसिद्ध ठिकाण आहे. पूर्वी गुप्तर घाटाच्या पायऱ्यांजवळ कंपनीची बाग होती, जी आता गुप्तर घाट जंगल म्हणून ओळखली जाते.
Travel Diaries : लक्षद्वीपमध्ये फिरायला जाण्याचा प्लॅन करताय? मग, ‘या’ बेटांना भेट द्यायला विसरू नका
Lakshadweep Travel Diaries : लक्षद्वीप हा भारताचा अतिशय सुंदर आणि नयनरम्य केंद्रशासित प्रदेश आहे. या प्रदेशाचे सौंदर्य अनेक पर्यटकांना भुरळ घालते. त्यामुळे, येथे देश-विदेशातील पर्यटकांची नेहमीच गर्दी असते. नुकतीच पंतप्रधान नरेंद्र मोदींनी लक्षद्वीपला भेट दिली होती.
या भेटीदरम्यान मोदींनी लक्षद्वीप येथील समुद्रकिनाऱ्यांवर फेरफटका मारला. त्यांनी समुद्रात डुबकी तर मारलीच शिवाय, स्नॉर्किंगचा आनंद ही मोदींनी लुटला. या वेळी मोदींनी खास फोटोशूट देखील केले होते. हे फोटो त्यांनी सोशल मीडियावर शेअर केले होते.
आज आपण लक्षद्वीपमधील काही सुंदर बेटांबद्दल जाणून घेणार आहोत. जे फिरण्यासाठी बेस्ट आहेत. तुम्ही जर या थंडीत फिरायला जाण्याचा विचार करत असाल तर लक्षद्वीपचा विचार करायला काही हरकत नाही.
मिनिकॉय द्वीप
लक्षद्वीपमधील सुंदर बेटांचा विचार करायचे झाल्यास या मिनिकॉय द्वीपचा उल्लेख सर्वात आधी करावा लागेल. हे बेट येथील स्वच्छ समुद्रकिनाऱ्यांसाठी आणि येथील नयनरम्य नजाऱ्यांसाठी प्रसिद्ध आहे.

मिनिकॉय द्वीप
मिनिकॉय येथील सीफूड अतिशय प्रसिद्ध आहे. जर तुम्ही सीफूडचे शौकिन असाल तर तुम्हाला येथे खाण्यामध्ये विविध प्रकारच्या डिशेस उपलब्ध मिळतील. येथील समुद्रकिनारे आणि रिसॉर्ट्स पर्यटकांना नेहमीच भुरळ घालतात. कपल्समध्ये हे द्वीप अतिशय प्रसिद्ध आहे.
बंगाराम द्वीप
हे द्वीप हिंदी महासागराच्या स्वच्छ आणि निळ्याशार पाण्यात वसलेले असून हे बेट भारतीय आणि विदेशी पर्यटकांमध्ये अतिशय प्रसिदध मानले जाते. सीफूडसोबतच तुम्ही येथील वॉटरस्पोर्टसचा ही आनंद घेऊ शकता.

बंगाराम द्वीप
यामध्ये तुम्ही स्कूबा-डायविंग, स्नॉर्कलिंग, कयाकिंग, खोल समुद्रातील मासेमारी आणि विंडसर्फिंग वॉटर स्पोर्टसचा ही आनंद घेऊ शकता. या बेटावरून नयनरम्य सूर्यास्त आणि सूर्योदय पाहणे ही पर्यटकांसाठी मोठी पर्वणी असते. त्यामुळे, अनेक कपल्स या बेटाला पसंती देतात.
कवरत्ती द्वीप
लक्षद्वीप या केंद्रशासित प्रदेशाची राजधानी म्हणून कवरत्ती द्वीपची खास ओळख आहे. या द्वीपवरील निळेशार पाणी, पांढरी वाळू आणि नयनरम्य नजारे हे पर्यटकांना नेहमीच भुरळ घालतात. त्यामुळे, अनेक कपल्सची या द्वीपला पहिली पसंती असते. येथे स्कूब डायविंग करायला अजिबात विसरू नका.

कवरत्ती द्वीप
आदिलशाहने बांधलेल्या नरसोबावाडीच्या दत्तमंदिराला कळस का नाही?
Datta Jayanti 2023 :
कोल्हापूरच्या पवित्र भूमीवर अनेक देवी देवतांचे पदस्पर्श झाले आहेत. त्यामूळे कोल्हापूर जिल्ह्यात अनेक पवित्र तिर्थस्थान निर्माण झाली आहेत. त्यापैकी एक म्हणजे कोल्हापूरातील शिरोळ तालूक्यात असलेले श्री क्षेत्र नृसिंहवाडी होय.
दत्तात्रेयांचा दुसरा अवतार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या नृसिंहसरस्वती स्वामींनी आपल्या तीर्थाटनात नृसिंहवाडीत वास्तव्य करून ही भूमी पानव केली आहे. या नृसिंहवाडीला दत्तमाहात्म्याचे अधिष्ठान लाभले आहे. त्यामूळेच आज ही वाडी दत्त महाराजांची राजधानी म्हणून म्हणून ओळखली जाते. (Datta Jayanti 2023)
नरसोबाच्या वाडीतील घुमट असलेले मंदिर बादशहा आदीलशहाने बांधले आहे, असे सांगितले जाते. याबद्दल नृसिहवाडीतील जाणकार नागरीकांकडून सांगण्यात येते की, या नरसोबाच्या मंदिराला कळस नाही. त्याचे एक खास कारण आहे.
विजापूरचा राजा आदिलशहाच्या मुलगी अंध होती. त्याकाळात श्री दत्त महाराजांची महती आदिलशहाच्या कानावर गेली. वाडीतील दत्तस्थान पवित्र आणि जागृत आहे असेही त्याला समजले.
आदिलशहा मुस्लिम धर्माचे असूनदेखील आपल्या मुलीसाठी काहीही करायला तयार होते. आपल्या मुलीसाठी आदिलशहा दर्शनासाठी या तीर्थक्षेत्री आला आणि त्याने दत्त महाराजांकडे त्यांच्या मूलीची दृष्टी परत मागितली. त्या नदीकाठी असलेल्या वनात पूर्वी केवळ श्रींच्या पादुका होत्या. ज्यावेळी त्या पादुकांवर आदीलशहाच्या मूलीने मस्तक ठेवले तेव्हा तिची दृष्टी परत मिळाली.
त्यामूळे खूश होऊन आदिलशहाने मंदिराचे बांधकाम मशिदीसारखे करून दिले. त्यामुळे या मंदिराला कळस नाही तर तिथे गोल घुमट आहे. एवढेच नाही तर मंदिरासमोर असलेले औरवाड आणि गौरवाड ही गावेही त्याने मंदिरासाठी दिली. आजही ती गावे मंदिरासाठी राखीव असून तिथे मंदिराची अधिकृत जमिन आहे.
नरसोबाच्या वाडीला नृसिंह सरस्वतींच्या पादुका आहेत. इतर मंदिरात असते तशी दत्त महाराजांची मूर्ती या मंदिरात नाही. इथे असलेल्या दत्त पादुकांची दररोज महापूजा होते. दुध, दही, तूप, मध साखर या पवित्र जिन्नसांचे पादुकांना दररोज स्नान घालण्यात येते. त्यानंतर फुलांनी अत्यंत सुरेख अशी सजावट करून त्यावर शाल पांघरली जाते. ही महापूजा भाविकांना दूर बसून पाहता येते.दत्तप्रभूंचे दुसरे अवतार म्हणून ज्यांना ओळखले जाते अशा नृसिंहसरस्वतींच्या नावाने ओळखल्या जाणाऱ्या क्षेत्राला दत्तभक्तांमध्ये दत्तप्रभूंची राजधानी म्हणून स्थान आहे.

वाडितल्या या मंदिराचा कळस घुमटासारखा आहेesakal
या मंदिरात पहाटे तीनपासून ते रात्रौ दहा वाजेपर्यंत दत्तभक्तीचा जागर येथे सुरू असतो. काकड आरती होते. पंचामृत अभिषेक, महापूजा, पवमान पठन, धूपदीप आरती, दत्तगजरात होणारा पालखी सोहळा आणि शेजारती असा नित्यक्रम असतो.
या मंदिराबाबतची आख्यायिका
१३७८ मध्ये कारंजा येथे नृसिंहसरस्वतींचा जन्म झाला. १३८८ मध्ये त्यांनी संन्यास दीक्षा घेतल्यानंतर ते तीर्थाटनास निघाले. त्यादरम्यान १४२१ साली त्यांचा मुक्काम औंदुबरी क्षेत्री होता. तर १४२२ मध्ये कृष्णा पंचगंगा संगमानजीकच्या नृसिहवाडी गावात होता. नृसिंहसरस्वतींनी येथे तब्बल बारा वर्षे तपश्चर्या केली.
या पवित्र संगमस्थळी तपसाधना केल्यानंतर १४३४ मध्ये त्यांनी येथे औदुंबर वृक्षातळी मनोहर पादुका आणि अन्नपूर्णा जान्हवीची स्थापना केली आणि आपण येथे वास करू अशी ग्वाही भक्तजनांना दिली व गाणगापुरी प्रस्थान केले. नृसिंहसरस्वतींच्या पावन वास्तव्यामुळेच या क्षेत्राला नृसिंहवाटिका म्हणून ओळखले जाऊ लागले. हीच आजची नृसिंहवाडी अथवा नरसोबाची वाडी होय.
प्रसिद्ध आहे दक्षिणद्वार सोहळा
कृष्णा पंचगंगेच्या तिरावर असलेल्या या मंदिरात महापुराचे पाणी पादुकांना स्पर्श करते, तेव्हा त्या प्रचंड वेगवान पाण्याच्या प्रवाहात दक्षिणद्वाराचं पुण्य घेण्यासाठी भाविक मोठय़ा संख्येने येतात. मंदिरात पाणी शिरले तरी पुराच्या पाण्यातून जात सारे नित्य सोपस्कार पार पाडले जातातपर्यंत पाणी आल्यावर .
Christmas 2023 :उत्तर भारतात मुघल सम्राटाने उभारले होते पहिले चर्च, असा आहे इतिहास
Christmas 2023 :
समाजात प्रेम अन् मानवतेचा संदेश रूजवणाऱ्या प्रभू येशूंचा जन्मदिवस म्हणून ख्रिसमस साजरा केला जातो. या दिवशी येशूंची प्रार्थना होते. लोक एकमेकांना शुभेच्छा देऊन हा सोहळा साजरा करतात. परदेशासह भारतातही ख्रिसमस मोठ्या उत्साहात साजरा केला जातो.
भारतातील ख्रिश्चन परंपरेला ऐतिहासिक वारसा आहे. असं म्हणतात की पहिल्या शतकात केरळमध्ये चर्च उभारण्यात आले होते. भारतावर बादशहा अकबराचे शासन होते. तेव्हा मुस्लिम धर्माचा प्रसार मोठ्या काळात झाला. पण एका मुस्लिम शासकाने ख्रिश्चन चर्चही बांधले.

अकबर चर्चची भव्य इमारत esakal
उत्तर भारतातील पहिले चर्च आग्रा येथे मुघल सम्राट अकबराने बांधले होते. या चर्चचे बांधकाम 1599 मध्ये सुरू झाले आणि 1600 मध्ये संपले. चर्चचे बांधकाम पाद्री जीसस झेवियर यांच्या देखरेखीखाली जबाबदारीने केले गेले. या चर्चचे काम पूर्ण झाल्यावर आग्रा येथे पहिल्यांदाच या चर्चमध्ये ख्रिसमसचा सण साजरा करण्यात आला.
मुघल काळातील पहिले ख्रिश्चन चर्च
हे चर्च मुघल राजवटीत पहिले ख्रिश्चन चर्च होते, जे 1599 मध्ये बांधले गेले होते. सर्वात मोठी गोष्ट म्हणजे हे चर्च आजही अस्तित्वात आहे. लोक आजही अकबरी चर्चच्या नावाने ओळखतात. चर्चच्या बांधकामानंतर, त्याच्या सौंदर्यात कोणतीही घट झाली नाही, परंतु चर्चच्या बांधकामानंतर काही काळानंतर, त्याचे भव्य बांधकाम पुन्हा राजकुमार सलीम म्हणजेच जहांगीरने केले.
चर्चमध्ये लागली होती आग
या चर्चच्या इतिहासात अनेक चढ-उतार आले आहेत. एकदा आग लागल्यामुळे या चर्चचे मोठे नुकसान झाले, त्यानंतर या चर्चची पुन्हा दुरुस्ती करण्यात आली. विशेष म्हणजे दीन-ए-इलाही हा नवा धर्म अकबराने सुरू केला होता. हे चर्च भारतात ख्रिश्चन धर्म मजबूत करण्यासाठी बांधले गेले होते.

16 व्या शतकात बांधूनही त्याच्या भिंती आजही भक्कम आहेत esakal
चर्चच्या बांधकामानंतर ६३ वर्षांनी आग्रा शहरात ख्रिश्चनांचे आगमन झाले. या चर्चच्या बांधकामानंतर ६३ वर्षांनंतर ख्रिश्चन आग्रा शहरात आले. आग्र्याच्या या चर्चमध्ये पहिल्यांदाच ख्रिसमसचा सण साजरा करण्यात आला, जो आजतागायत सुरू आहे. सध्या या चर्चच्या देखरेखीची जबाबदारी फादर इग्निस मेरिंडा यांच्याकडे आहे.
फादर इग्निस मेरिंडा सांगतात की, या चर्चवर देश-विदेशातील सर्व धर्माच्या लोकांची श्रद्धा आहे, जे आजही नवस बोलून या चर्चमध्ये येतात. ख्रिसमसच्या निमित्ताने चर्चमध्ये केवळ आग्राहूनच नाही तर बाहेरचे लोकही येतात. अकबर चर्च ख्रिसमसच्या आधी सजवले जाते, त्यामुळे या चर्चच्या सौंदर्यात भर पडते.
उत्तर प्रदेशमध्ये स्थित आग्रा हे एक महत्त्वाचे आणि प्रसिद्ध पर्यटन स्थळ आहे, जे अनेक सुंदर ऐतिहासिक इमारती आणि स्थळांनी भरलेले आहे. अकबराच्या चर्चला भेट देण्याचे मुख्य कारण म्हणजे या चर्चची वास्तुकला, या चर्चची मध्यवर्ती भिंत लाल दगडांनी बनलेली आहे, त्यावर कोरीवकाम केलेले आहे, ते मुघलकालीन वास्तुकलेशी जुळते. जर आपण चर्चचे संपूर्ण स्वरूप पाहिले तर ते मुघल कलेशी जुळते.
घरात पाण्याच्या झऱ्यात सापडली सोन्याची दत्तमूर्ती, वजन शुन्य असूनही सहज उचलणे अशक्यच
Datta Jayanti 2023 :
कलियुगातही चमत्कार घडतात आणि हे घडलेले चमत्कारच आपल्याला देव आहे याची जाणिव करून देतात. आता अलिकडेच २०१८ मध्ये कणकवलीत राहणाऱ्या एका कुटुंबाला साक्षात दत्त गुरूंनीच आशिर्वाद दिला आहे. कणकवलीच्या मोहित्यांच्या घरी दत्त महाराज प्रगटले होते. त्याची कथा काय आहे हे आपण पाहुयात.
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कणकवलीपासून अलिकडे असलेल्या जाणवली गावातील ही घटना आहे. जाणवली गावात मोहिते कुटुंबियांचा बंगला आहे. बंगला बांधल्यानंतर परसाबागेजवळ एका खोलीचे बांधकाम सुरू होते. ती खोली बांधून पूर्ण झाली. मोहित्यांनी ती वापरायलाही काढली. पण थोड्याच दिवसात असं लक्षात आलं की, या खोलीत कुठुनतरी पाणी पडत आहे. (Datta Jayanti)
प्रथमदर्शनी वाटायचं की आडवा-तिडवा पाऊस पडल्यावर खोलीत पाणी आलं असेल. किंवा घराखालून गेलेली एखादी पाईपलाईन फुटली असेल. पण, खोलीत पाणी यायचं कारण वेगळंच होतं. खोलीत बसवलेल्या फरशीतूनच उमाळ फुटत होता. जिथून उमाळ फुटला तिथे मोहिते यांनी खोदकाम केलं तेव्हा तिथे साडे तीन फुटावरच त्यांना पाण्याचा झरा अन् दत्त महाराजांची सोन्याची मूर्ती सापडली.
या मूर्तीचे वैशिष्ट्य असं आहे की, सोन्याची भरीव मूर्ती असून ती कोरीव आहे. ही मूर्ती सापडली तेव्हा तिच वजन केलं तेव्हा ते शून्य दाखवतं. कोणत्याही काट्यावर ठेवली तरी तेच वजन येतं. याची अजूनही पंचक्रोशीत चर्चा होते.

श्री गुरूदेव दत्तांची हीच ती आकर्षक सोन्याची मूर्तीesakal
पण, इतकं कमी वजन दाखवत असूनही एका हातात उचलणे शक्य नाही. विशेष गोष्ट अशी की, जेव्हा ही मूर्ती मिळाली तेव्हापासून रूममध्ये येणारे पाणीही बंद झाले. मोहिते परिवारानेच मंदिर बांधून तिथे मूर्तीची प्रतिष्ठापणा केली. तर, आजूबाजूच्या गावातील लोकांना ही दत्त मूर्ती नवसाला पावणारी आहे.
साधारण ८०० ते ९०० वर्षांपूर्वीची ही मूर्ती असल्याचा अंदाज गावकरी बांधतात. येथे दरवर्षी दत्तजयंतीला मोठा सोहळा पार परडो. तर गुरूवार, पौर्णिमा यावेळीही विशेष पूजा बांधली जाते. जसा या मूर्तीच्या देवत्वाचा प्रसार होत गेला तसे तिथे भक्तांची गर्दी वाढू लागली आहे.
Dakini Temple : सायंकाळी ६ नंतर या मंदिरात काय घडतं? कोणासही प्रवेश करण्यास आहे मनाई
Dakini Temple :
एखादे प्राचिन मंदिर म्हटलं की देवांची प्रतिमा, देवांची आरती, पूजा केली जाते. दिवसातून पाच ते सहावेळा देवांची आरती, नैवेद्य सुरू असतात. पण आपल्या देशात एक मंदिर असं आहे. जिथे सायंकाळ झाली की, मंदिर बंद केलं जातं. आणि ते सकाळीच उघडतं.
मधेपुरा जिल्ह्यातील आलमनगर तालुक्यातील खुरहान गावातील माता डाकिनी मंदिर परिसरात हा नियम वेगळा आहे. संध्याकाळी 6 नंतर या मंदिरात प्रवेश करण्यास मनाई आहे. पुजारी सांगतात की मंदिराचे दरवाजे सकाळी 6 वाजता उघडतात आणि संध्याकाळी 6 वाजता बंद होतात.
देवी डाकिनी मंदिरात दररोज बकऱ्यांचा बळी दिला जातो, जो येथील अनोख्या पूजेचा एक भाग आहे. याशिवाय येथे जास्तीत जास्त लाडूंचा नैवेद्य दाखवला जातो, जो एक विशेष धार्मिक विधी दर्शवतो.
या मंदिराची स्थापना 1348 मध्ये झाली होती. दुर्गा माता म्हणून प्रसिद्ध असलेल्या खुर्हानची माता डाकिनी जवळपास सातशे वर्षांपासून या ठिकाणी आहे. मंदिराचे पुजारी कमलेश झा सांगतात की, आईने त्यांचे आजोबा पंडित भयो झा यांना स्वप्नात दर्शन दिले होते. त्यानंतर 1348 मध्ये स्थानिक लोकांच्या मदतीने येथे मंदिर बांधले गेले.
येथे दूर्गा मातेच्या 9 व्या रूपाची पूजा केली जाते. लोक या मातेला माता जंगलवाली, माता डाकिनी आणि माता छिन्नमस्तिका या तीन नावांनी ओळखले जाते. माता जंगलवाली हे नाव आहे, कारण इथे माता जंगलात वास करत असे, तर माँ छिन्नमस्तिकेचा अर्थ आहे की ती राक्षसांचे मस्तक कापणारी आहे.
या मंदिरात मातेचा वास आहे
पंडित कमलेश सांगतात की, डाकिनी मातेच्या मंदिरात सकाळी 6 ते संध्याकाळी 6 या वेळेत पूजा केली जाते. यानंतर मंदिर परिसरात लोकांना प्रवेश बंदी आहे. त्यांच्या मते या ठिकाणी संध्याकाळनंतर माता स्वत: मंदिराच्या विशाल आवारात फेरफटका मारते, अशी श्रद्धा या भक्तांची आहे.
गोव्यात महागड्या हॉटेलवर पैसे खर्च करू नका, इथे रहा, निम्म्याहून अधिक पैसे वाचतील
लाईव्ह न्यूज
Cheap Hotels In Goa : गोव्यात महागड्या हॉटेलवर पैसे खर्च करू नका, इथे रहा, निम्म्याहून अधिक पैसे वाचतील

New Year Tour : कंटाळा घालवण्याचे ठिकाण म्हणून गोव्याला पर्यटकांनी नेहमीच पसंती मिळते. नव्या वर्षाची पार्टी आणि ख्रिसमसमुळे गोव्याला जाणाऱ्यांची संख्या जास्त असते. गोव्यात इतरवेळी कमी किंमतीत सहज मिळणाऱ्या सोयी-सुविधा वर्ष संपत आल्यावर महाग होतात.
कारण, नव्या वर्षाच्या स्वागताला गोव्यात विदेशी पर्यटक गर्दी करतात. त्यामुळे खाण्या-पिण्यासह राहण्यासाठीचे हॉटेल्सचे दरही वाढवले जातात. तुम्हीही तुमचा गोव्याला जाण्याचा प्लॅन पूर्ण करणार असाल, तर गोव्यात हॉटेल्समध्ये न राहता अशा काही खास ठिकाणी रहा जिथे कमी पैशात राहण्याची सोय होईल.
गोव्यात काही सरकारी कॉटेज, हॉटेल्स आहेत जे तुम्हाला अगदी रास्त दरात मिळू शकतात. इतर हॉटेल प्रमाणेच इथे सर्व सुखसुविधाही उपलब्ध आहेत. त्यामुळे गोव्याला गेल्यानंतर या जागी राहण्याचा विचार तुम्ही करू शकता.
कोलवा रेसिडेन्सी
साऊथ गोव्यातील लोकप्रिय कोलवा बीचजवळ कोलवा रेसिडेन्सी आहे. हे सरकारी कॉटेज आहे. या हॉटेलमध्ये तुम्ही डबल रूम-स्टँडर्ड, एसी-स्टँडर्ड रूम, एसी स्टँडर्ड रूम या श्रेणींमध्ये रूम बुक करू शकता. हॉटेलमध्ये एकूण 47 खोल्या आहेत.
सरकारी हॉटेल आहे असे समजून या हॉटेलला कमी लेखण्याची चूक करू नका. या हॉटेलमध्ये तुम्हाला कोणत्याही 3 स्टार हॉटेलप्रमाणे सुविधा मिळतील. हॉटेलमध्ये रेस्टॉरंट आणि ओपन गार्डन सुविधा देखील आहेत.
बल
रूम-स्टँडर्ड, एसी-स्टँडर्ड रूमचे भाडे - झनमध्ये 2,530-2,970 च्या दरम्यान
असते. इतर दिवसांमध्ये, डबल रूम-स्टँडर्ड, AC-स्टँडर्ड रूमचे भाडे 2,300-
2,700 रूपयांच्या दरम्यान असते.

कलंगुट रेसिडेन्सी
पणजीपासून
16 किमी अंतरावर असलेले कलंगुट रेसिडेन्सी हे गोवा पर्यटनाचे एक हाय
स्टँडर्ड हॉटेल आहे. येथे तुम्ही 4 वेगवेगळ्या श्रेणींमध्ये खोल्या बुक करू
शकता. या हॉटेलमधील खोल्या डिलक्स सी फ्रंट व्ह्यू, एसी सूट, एसी डिलक्स
साइड व्ह्यू आणि एसी डिलक्स कॉटेज श्रेणींमध्ये बुक केल्या जाऊ शकतात.
या हॉटेलमध्ये एकूण 52 खोल्या आहेत. या हॉटेलमध्ये तुम्हाला कोणत्याही 4 स्टार हॉटेलप्रमाणे सुविधा मिळतील. पीक सीझनमध्ये म्हणजेच 23 डिसेंबर ते 1 जानेवारी 2024 दरम्यान, येथील रूमचे भाडे थोडे जास्त आकारले जाईल.

गोव्यातील प्रत्येक हॉटेल सी साईडशिवाय पूर्ण वाटत नाही. तुम्हालाही गोव्यातील एखाद्या हॉटेलमध्ये परवडणाऱ्या किमतीत राहायचे असेल, ज्यामध्ये समुद्राचे विहंगम दृश्य आहे. तर मिरामार रेसिडेन्सी तुमच्यासाठी योग्य आहे.
सकाळी आणि संध्याकाळी समुद्र किनार्यावर फेरफटका मारा आणि नेत्रदीपक सूर्योदय किंवा सूर्यास्त पहा किंवा ख्रिसमस आणि नवीन वर्षाच्या बीच पार्टीमध्ये सामील व्हा.

फार्मगुरी रेसिडेन्सी
फार्मगुरी रेसिडेन्सी फोंडा येथे सर्वत्र हिरवाईने वसलेली आहे. तुम्हाला हवे असल्यास, तुम्ही तुमची ख्रिसमस किंवा नवीन वर्षाची पार्टी या हॉटेलच्या खुल्या लॉनमध्ये ठेवू शकता. हॉटेलमध्ये एकूण 39 खोल्या आहेत.
एसी स्टँडर्ड रूम, डबल रूम-स्टँडर्ड, एसी सूट आणि डॉर्मिटरीमध्ये बेडच्या आधारावर या खोल्या बुक केल्या जाऊ शकतात. हे हॉटेल इतर सर्व हॉटेल्सच्या तुलनेत खूपच स्वस्त आहे. पणजीपासून अवघ्या २६ किमी अंतरावर हे हॉटेल आहे.
वास्को रेसिडेन्सी
तुम्हाला शहराच्या मध्यभागी रहायचे असेल.तर, वास्को रेसिडेन्सी हा उत्कृष्ट पर्याय आहे. तुम्हाला शॉपिंग मॉल किंवा सिनेमा हाऊसमध्ये जायचे असेल, अगदी थोड्या अंतरावर तुम्हाला सर्व काही मिळेल. हॉटेलच्या रेस्टॉरंटमध्ये तुम्ही गोव्याच्या विविध पदार्थांचा आस्वाद घेऊ शकता.
विमानतळापासून जवळ असल्यामुळे, ज्या लोकांना सकाळी लवकर विमान पकडावे लागते ते या हॉटेलमध्ये बुक करतात. हॉटेलमध्ये एकूण 45 खोल्या आहेत ज्या डबल रूम-स्टँडर्ड आणि एसी स्टँडर्ड रूम श्रेणींमध्ये बुक केल्या जाऊ शकतात.

ब्रेक घ्या, डो
Sita Rasoi : सीता मातेचे स्वयंपाकघर आजही जसेच्या तसे आहे, तुम्ही पाहीलंय का?
Sita Rasoi :
सीता मातेचे स्वयंवर झालं आणि ते अयोध्येला आले. तेव्हा श्री रामांना वनवासाला जावं लागलं त्यांच्यासोबत सीता आणि लक्ष्मण सुद्धा गेले. तिथे रावणाने सीतेचे हरण केले त्यानंतर वानरसेना बणवून श्रीरामांनी सीतामातेला सोडवून अयोध्येत आणले.
१४ वर्षांचा वनवास भोगून प्रभू श्रीराम अयोध्येला परतले. श्रीरामांच्या स्वागतासाठी संपूर्ण अयोध्या नगरीने दिवे लावून त्यांचे स्वागत केले होते. त्या दिवसापासून दिवाळी साजरी करण्याची प्रथा रूढ झाली असे पुराणांमध्ये सांगितले जाते.
रामायणातील काही प्रसंगांच्या पाऊलखूणा आजही सापडतात. उत्तर प्रदेशातील मंदाकिनी नदीच्या काठावर असलेले चित्रकूट धाम हे असे स्थान आहे जिथे माता सीतेने आपला बहुतेक वेळ घालवला होता. या धाममध्ये माता सीतेचे स्वयंपाकघर आहे, जिथे माता सीता स्वयंपाक करायच्या. इथे त्या महर्षी ऋषींना भोजन द्यायच्या.
चित्रकूट धामचा इतिहास हजारो वर्षे जूना आहे. लाखो भाविक येथे भगवंताच्या दर्शनासाठी येतात. येथे कामद गिरी नावाचा पर्वत आहे, जो कोणी या पर्वताला प्रदक्षिणा घालतो त्याच्या सर्व इच्छा पूर्ण होतात, असे मानले जाते.
या ठिकाणी तुम्हाला भारत मिलाप मंदिर देखील पाहायला मिळेल. हे ते ठिकाण आहे जेव्हा वनवासात असताना बंधू भरत यांनी श्रीरामांना वनवास सोडून परत या आणि अयोध्येची गादी सांभाळा, अशी विनंती केली होती. परंतू श्रीरामांनी राजतंत्र नाहीतर एका मुलाने पित्याला दिलेले वचन पाळले. आणि वनवासाचा काळ पुर्ण करूनच ते अयोध्येला परतले.

सीता मातेचे स्वयंपाकघरesakal
येथे एक मंदिर आहे ज्यावर सीता रसोई असे लिहिलेले आहे. माता सीता येथे स्वयंपाक करायच्या. या मंदिरात सिता मातेची पोळपाट लाटणे, चूल, इतर मातीची भांडी आहेत. हे मंदिर रामजन्मभूमीच्या उत्तर-पश्चिम भागात आहे. मंदिरात तुम्हाला भगवान राम, माता सीता यांच्यासह लक्ष्मण, भरत आणि शत्रुघ्न आणि त्यांच्या पत्नींची छायाचित्रेही पाहायला मिळतील.
या मंदिरात तुम्हाला स्वयंपाकघरातील भांड्यांमुळेच लोक या मंदिराला मातेचे स्वयंपाकघर मानतात. इथे भेट देऊन इतिहासातील हा ठेवा पहायला लोक उत्सुक असतात. खास करून महिला वर्गात याचे आकर्षण आहे. माता सीता साक्षात देवीचेच रूप, त्यांचा स्पर्श झालेल्या या भांड्याचे आशिर्वाद घेऊन आपणही अन्नपुर्णा होऊ अशी महिलांची भाबडी इच्छा असते.

या गाभाऱ्यात स्वयंपाकातील रोजच्या वस्तू जतन करण्यात आल्यात esakal
Temples In India : या देवळात देव नाहीतर बुलेट अन् विमानाची केली जाते पूजा; इथल्या देवांची कथाच निराळी
Temples In India : भारत हा असा देश आहे जिथे पावला पावलावर काही प्राचीन मंदिर सापडतील. या मंदिरांची स्वतःची वेगळी ओळख आहे. जिथे लोक दूरदूरवरून प्रार्थना करण्यासाठी येतात.
पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांचीही देशात मंदिरे बांधण्यात आली आहेत. पण तुम्ही कधी मोटारसायकल मंदिराबद्दल ऐकले आहे का?
कारण ही कल्पना नसून सत्य आहे. राजस्थानमध्ये एक गाव आहे, जिथे देवाची मूर्ती नाही तर रॉयल एनफिल्ड बुलेट 350 मंदिराच्या आत ठेवण्यात आली आहे. इथली खास गोष्ट म्हणजे या बुलेटची पूजा करण्यासाठी दूरदूरवरून लोक येतात.
मंदिराचे नाव काय?
या मंदिराचे नाव 'ओम बन्ना धाम' आहे. लोक त्याला 'बुलेट बाबा मंदिर' या नावानेही ओळखतात. साधारण 30 वर्षांपूर्वी या गावातील ठाकूर जोगसिंग राठोड यांचा मुलगा ओमसिंग राठोड याचा रस्ता अपघातात मृत्यू झाला होता. हे मंदिर त्याच ओम सिंह यांच्या नावाने बांधण्यात आले आहे.
मंदिर कुठे आहे?
ओम बन्ना धाम बुलेट बाबा मंदिर हे राजस्थानच्या जोधपूरपासून 50 किलोमीटर अंतरावर असलेल्या पाली शहराजवळील चोटीला गावात आहे.
बुलेट बाबा मंदिराची थक्क करणारी कहाणी
ओम सिंग राठोड या व्यक्तीचा रस्ता अपघातात मृत्यू झाला तेव्हा पोलिसांनी दुचाकी आणि त्यांचा मृतदेह ताब्यात घेतला. मात्र घटनेच्या दुसऱ्या दिवशी ही दुचाकी पोलिस ठाण्यातून गायब असल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले. यानंतर दुचाकीचा शोध सुरू केला असता. ज्या ठिकाणी अपघात झाला त्याच ठिकाणी पोलिसांना दुचाकी सापडली.
दुचाकी पुन्हा पोलिस ठाण्यात आणली. त्या रात्रीही असाच प्रकार घडला. ही घटना रोज सातत्याने घडू लागली. यानंतर एक दिवस पोलिसांनी रात्री पाळत ठेवली. पण पुढे जे घडले ते सर्वांनाच चकित केले.
रात्रीच्या वेळी दुचाकी स्वतःहून सुरू होऊन अपघातस्थळी जात होती. ही घटना पाहिल्यानंतर पोलिसांनी दुचाकी कुटुंबीयांना परत केली. कुटुंबियांनीही बुलेटचे मंदिर बांधून त्यांची पूजा करण्यास सुरुवात केली.
एरो प्लेन गुरुद्वारा, जालंधर
जालंधर, पंजाबमधील एरो प्लेन गुरुद्वारा आहे. इथे येण्यासाठी तुम्हाला पासपोर्ट आणि व्हिसा मिळण्याची काळजी करण्याची गरज नाही. येथे लोक खेळणी विमाने दान करतात आणि व्हिसा आणि पासपोर्ट मिळविण्याची समस्या संपवण्यासाठी देवाचा आशीर्वाद मागतात. इथे मागितलेली मागणीही पूर्ण होते, असे भाविकांची श्रद्धा आहे.
Shravan 2023 : महादेवांचा चमत्कारीक नंदी; वर्षानुवर्षे भारतातील या मंदिरातील नंदीचा आकार वाढतोय
Shravan 2023 : भारतातल्या अनेक मंदिरांना विशिष्ट असा इतिहास आहे. त्यांची काही खास वैशिष्ट्ये आहेत. आज श्रावणातील शेवटचा सोमवार आहे. महादेवांच्या मंदिरांत भाविकांनी गर्दी केली आहे. पुन्हा श्रावणातील सोमवारसाठी वर्षभर वाट पहावी लागणार असल्याने मंदिरात भक्तांची आज जास्त गर्दी दिसून येईल.
श्रावणाच्या शेवटच्या सोमवार निमित्त आपण महादेवांच्या एका चमत्कारीक मंदिराबद्दल जाणून घेऊयात. यागंती उमा महेश्वरा मंदिर हे भारतातील आंध्र प्रदेश राज्यातील कुर्नूल या ऐतिहासिक जिल्ह्यात स्थित सर्वात जुने आणि प्रसिद्ध मंदिरांपैकी एक आहे.
या मंदिराचे वैशिष्ट्य म्हणजे भारतातील हे असे मंदिर आहे जिथे असलेल्या महादेवांच्या नंदीचा आकार वाढत आहे. होय, तुम्ही बरोबर ऐकलंत, याच खास मंदिराची वैशिष्ट्ये काय आहेत पाहुयात.
महादेवांचे हे मंदिर श्री यागंती उमा महेश्वरा स्वामी मंदिर म्हणूनही ओळखले जाते. हे भगवान शिवाला समर्पित आहे आणि देशातील सर्वात शक्तिशाली भगवान शिव मंदिरांपैकी एक मानले जाते. या मंदिराला वर्षभर जगभरातून मोठ्या संख्येने भाविक भेट देतात.
यागंती मंदिराचा इतिहास
यागंती उमा महेश्वर मंदिराचे बांधकाम पाचव्या शतकातील आहे. हे मंदिर भारताच्या दक्षिणेकडील सर्वात प्राचीन आणि महत्त्वपूर्ण मंदिरांपैकी एक मानले जाते. पौराणिक कथेनुसार, हे मंदिर भगवान शिवाचे प्रिय असलेल्या अगस्त्य ऋषींनी बांधले होते. या मंदिराचा अनेक वेळा जीर्णोद्धार करण्यात आला आहे आणि आता ते एक भव्य आणि पवित्र पूजास्थान म्हणून उभे आहे.
यागंती उमा महेश्वर मंदिराची आख्यायिका
यागंती उमा महेश्वराच्या मंदिराच्या अनेक दंतकथा आहेत. सर्वात लोकप्रिय म्हणजे हिंदू धर्मातील दोन महत्त्वाच्या ग्रह देवता राहू आणि केतू यांचा समावेश आहे. असे मानले जाते की दोन्ही देवतांनी या मंदिरात भगवान शंकराची पूजा केली आणि त्यांना अपार शक्ती आणि सामर्थ्य प्राप्त झाले.
दुसर्या आख्यायिकेनुसार, भगवान बालाजी पत्नी देवी पद्मावतीसह मंदिरात गेले होते. मंदिराची स्थापत्यकला देखील भारताच्या प्राचीन सभ्यतेचा आश्चर्यकारक पुरावा असल्याचे म्हटले जाते.

यागंती उमा महेश्वर मंदिर आंध्र प्रदेशची वास्तुकला
यागंती उमा महेश्वर मंदिर, त्याच्या गुंतागुंतीच्या आणि विस्मयकारक वास्तुकला असलेले, भारतातील सर्वात सुंदर मंदिरांपैकी एक आहे. मंदिराचे मुख्य प्रवेशद्वार, त्रिपुरांथक गेट म्हणून ओळखले जाते, असे मानले जाते की चालुक्य राजांनी बांधले होते. हे मंदिर द्रविडीयन मंदिर स्थापत्यकलेचे उत्तम उदाहरण आहे आणि त्यात चालुक्य, चोल आणि विजयनगर राजवंशांच्या शैलींचे एक मनोरंजक मिश्रण आहे.
मंदिराच्या मुख्य गाभार्यात स्वयंभू लिंग किंवा भगवान शिवाचे स्वतः वाढलेले लिंग आहे. मंदिरात काही मनोरंजक शिल्पे आणि कोरीवकाम देखील आहेत, ज्यात देवी सरस्वती आणि दुर्गा यांचा समावेश आहे. असे म्हटले जाते की मंदिराची रचना अशा प्रकारे केली गेली होती की वर्षातील विशिष्ट दिवशीच सूर्यप्रकाश स्वयंभू लिंगावर पडतो.
यागंती उमा महेश्वराच्या मंदिरात वर्षभर अनेक उत्सव साजरे होतात. येथील सर्वात महत्वाच्या सणांपैकी एक म्हणजे महाशिवरात्री जो मोठ्या थाटामाटात साजरा केला जातो. या शुभदिनी येथे देशभरातून भाविक दर्शनासाठी येतात. (Temples)

महादेवांचा कलेकलेने वाढणारा नंदीesakal
यागंती मंदिरात नंदी वाढण्याचे रहस्य
नंदीला भगवान शिवाचे वाहन मानले जाते आणि शक्ती आणि भक्तीचे प्रतीक म्हणून त्याची पूजा केली जाते. यागंती मंदिरातील नंदीची मूर्ती काळ्या ग्रॅनाइटपासून बनलेली असून ती दक्षिण भारतातील सर्वात मोठ्या मूर्तींपैकी एक असल्याचे म्हटले जाते. ही मूर्ती अंदाजे 15 फूट लांब आणि 9 फूट उंच आहे आणि ती 5,000 वर्षांपासून अस्तित्वात असल्याचे मानले जाते.
यागंतीमध्ये वाढणारी नंदी
या मंदिरातील खास गोष्ट म्हणजे मंदिरात असलेल्या नंदी महाराजांचा आकार दिवसेंदीवस वाढत आहे. सुरुवातीला ही मूर्ती सध्याच्या आकारापेक्षा खूपच लहान होती. अनेक वर्षांपासून ती वाढत आहे. आता या मूर्तीचा आकार इतका वाढलाय की ती मूर्ती मंदिराच्या छताला टेकली आहे.
नंदीची मूर्ती का वाढत आहे?
नंदी महाराजांच्या वाढत्या आकाराबाबत काही सिद्धांत आहेत. काही लोकांचा असा विश्वास आहे की हे त्या क्षेत्रातील चुंबकीय क्षेत्रामुळे किंवा मंत्र आणि प्रार्थनांच्या उच्चारामुळे होणारी तीव्र कंपनांमुळे असे घडत आहे. इतरांचे म्हणणे आहे की भगवान शिवांची या मंदिरावर कृपा आहे त्यामुळे मूर्तीचा आकार वाढत आहे. हा एक चमत्कारच आहे. (Lord Shiva)

महादेवांच्या मंदिराचा परिसरesakal
नंदी मूर्तीचा आकार वाढवण्याचे शास्त्रीय स्पष्टीकरण
शास्त्रज्ञ आणि संशोधकांनी नंदीच्या मूर्तीचा अभ्यास केला आणि काही निष्कर्ष काढले. त्यांच्या म्हणण्यानुसार नंदी मूर्तीचा आकार वाढत नाही, तर प्रत्यक्षात ती मंदिराची रचना आहे जी जमिनीत बुडत आहे. या बुडण्याच्या हालचालीमुळे मूर्ती मूळ आकारापेक्षा मोठी दिसते.
वैज्ञानिक स्पष्टीकरण असूनही, भक्तांचा असा विश्वास आहे की मूर्तीची वाढ भगवान शंकराच्या आशीर्वादामुळे होते. ते आपली प्रार्थना करण्यासाठी आणि भगवान शिव आणि नंदीचा आशीर्वाद घेण्यासाठी दूरदूरहून येतात. हे मंदिर पर्यटकांना आणि अभ्यागतांना देखील आकर्षित करते जे नंदीच्या वाढत्या मूर्तीच्या अद्वितीय घटनेचे साक्षीदार होण्यास उत्सुक आहेत.
Historical Places : इथल्या कुंडात एकदा अंघोळ करा, असाध्य आजाराही होतील बरे, पुराणांशी आहे थेट संबंध
Historical places : भारत हा इतिहास जगणारा देश आहे. भारतात पुराणांमध्ये घडलेल्या घटनांचे पुरावे आजही आपल्याला पहायला मिळतात. रामायणातील जटायू वध असेल किंवा नाशिकमधील पंचवटी वन असेल. या गोष्टी आजही भूतकाळात घडलेल्या घटनांची प्रचिती आपल्याला देत आहेत.
रामायण-महाभारतातील मनुष्यरूपी देवांनी केलेल चमत्कार आजही घडतात. महाभारतात पांडव होते तर रामायणात राम-लक्ष्मणाची जोडी. रामायणात बांधलेला रामसेतू खरचं बांधला होता हे नासा (NASA) नेही मान्य केलं आहे.
असेच काही चमत्कारीक कुंड, जलाशय आजही आहेत जिथे अंघोळ केल्यानंतर अनेक असाध्य आजारांवर मात केली जाऊ शकते. होय, तुम्ही बरोबर ऐकलंत. आज आपण अशाच काही ठिकाणांची माहिती घेणार आहोत.
भीमकुंड
भीमकुंड मध्य प्रदेशातील छतरपूर येथे आहे. हा कुंड दिसायला साधा असली तरी अतिशय गूढ ठिकाण आहे. असे मानले जाते की हे कुंड महाभारतकाळातील आहे. मात्र, ते किती खोल आहे, हे कुणालाच कळू शकलेले नाही. भीमकुंडात अंघोळ केल्यास आरोग्य सुधारू शकते, असा स्थानिकांचा विश्वास आहे.
गंगनानी
उत्तराखंडच्या गंगोत्री मार्गावर गंगनानी नावाचं एक छोटंसं गाव आहे. येथे येणारे भाविक येथे उकळलेल्या गरम पाण्याच्या पात्रात डुबकी मारतात. येथे आंघोळ केल्याने त्यांचे अनेक शारीरिक विकार दूर झाले आहेत, असे बहुतांश लोकांचे मत आहे.
मणिमहेश तलाव
मणिमहेश तलाव कैलास पर्वतावर स्थित आहे. हे ठिकाण हिमाचल प्रदेशात आहे. येथे एक अतिशय सुंदर तलाव आहे, जिथे हजारो लोक स्नान करतात, स्थानिकांचा असा विश्वास आहे की येथील पाण्यामुळे स्नायू मजबूत तर होतातच, शिवाय शारीरिक जखमाही भरून निघतात.
पुष्कर सरोवर
राजस्थानमध्ये असलेले पुष्कर जगभरात प्रसिद्ध आहे. तसेच येथे एकमेव ब्रह्ममंदिर आहे. रामायणासारख्या पवित्र धार्मिक ग्रंथांमध्येही पुष्करचा उल्लेख आढळतो. प्राचीन काळापासून येथील लोकांची अशी श्रद्धा आहे की या पवित्र तलावात स्नान केल्याने शारीरिक व्याधी दूर होतात. येथे आंघोळ केल्याने कॅन्सरही बरा होतो, अशी लोकांची श्रद्धा आहे.
Navratri 2023 : शक्तीचे प्रतिक आहे भारतातील हे मंदिर, एक नाही तर ६४ योगिनींचा मिळतो आशिर्वाद
Navratri 2023 : भारतात देवीची शक्ती असलेली अनेक मंदिरे आहेत. त्यापैकी अनेक मंदिरात दैवी शक्तीचा आजही वास आहे. देवीच्या शक्तीची प्रचिती त्या ठिकाणी गेल्यानंतर आपल्याला सहज होते.
लवकरच देशभरात नवरात्रोत्सवाला प्रारंभ होणार आहे. नवरात्रोत्सव हा नऊ रात्रींचा जागर असतो, त्यामुळे या खास दिवसात देवींच्या अनेक मंदिरांना भक्तगण भेट देतात. आज आपण अशाच एका मंदिराची माहिती घेणार आहोत. जिथे एक दोन नव्हे तर तब्बल ६४ देवींचा वास होता आणि आजही तिथे एक सकारात्मक शक्ती अनुभवण्यास मिळते. ()
भारतातील ६४ योगिनी मंदिर
भारतात एकूण चार चौसष्ठ योगिनी मंदिरे आहेत. त्यापैकी मध्य प्रदेशातील मुरैना येथे असलेले चौसष्ठ योगिनी मंदिर सर्वात प्रमुख आणि प्राचीन आहे. मुरैना येथे असलेले हे भारतातील असे प्राचिन मंदिर आहे जे अजूनही चांगल्या स्थितीत आहे.
एकेकाळी हे मंदिर तंत्र-मंत्रासाठी खूप प्रसिद्ध होते. म्हणून या मंदिराला तांत्रिक विद्यापीठ असेही म्हटले जाते. देश-विदेशातून लाखो लोक येथे तांत्रिक तंत्र-मंत्र शिकण्यासाठी येत होते. आज या मंदिराच्या काही खास गोष्टी जाणून घेऊयात. (Ekattarso Mahadev Mandir Chausath Yogini Temple history and unknown facts)
चौसष्ठ योगिनीच्या या मंदिरात जाण्यासाठी २० पायऱ्या चढून जावे लागते. हे मंदिर गोलाकार असून त्यात ६४ खोल्या आहेत. यातील प्रत्येक खोलीत एक शिवलिंग आहे. मंदिराच्या मध्यभागी एक मोकळा मंडप आहे. ज्यामध्ये एक मोठे शिवलिंग आहे. हे मंदिर १३२३ मध्ये क्षत्रिय राजांनी बांधले होते.

चौसष्ठ योगिनीच्या या मंदिरात जाण्यासाठी २० पायऱ्या चढून जावे लागतेesakal
या मंदिरातील प्रत्येक खोलीत शिवलिंगासोबत योगिनी देवीची मूर्ती होती. पण त्यातील काही मूर्ती चोरीला गेल्यामुळे या मूर्ती आता दिल्लीच्या संग्रहालयात ठेवण्यात आल्या आहेत. त्यामुळे या मंदिराला चौसष्ठ योगिनी मंदिर असे नाव पडले.
हे मंदिर १०१ खांबांवर विराजमान आहे. भारतीय पुरातत्व विभागाने हे मंदिर प्राचीन ऐतिहासिक वास्तू म्हणून घोषित केले आहे. ब्रिटीश वास्तुविशारद एडविन लुटियन्स यांनी या मंदिराच्या आधारावरच दिल्लीचे संसद भवन बांधले होते. पण, याबद्दलची माहिती कुठेही सापडत नाही. मंदिर केवळ बाहेरून संसद भवनासारखेच नाही तर आतमध्ये खांबांची रचना देखील सारखीच आहे.
या सर्व ६४ योगिनी देवी आदिशक्ती कालीचे अवतार आहेत. घोर नावाच्या राक्षसाशी युद्ध करताना काली मातेने योगीनी देवीचा अवतार घेतला असल्याचे पौराणिक मान्यता आहे. चौसठ योगीनी मंदिर एकेकाळी तांत्रिक विद्यापीठ म्हणून ओळखले जात होते. एकेकाळी या मंदिरात तांत्रिक सिद्धी मिळविण्यासाठी तांत्रिकांचा मेळा भरत असे.
Shravan 2023 : १२ महिने २४ तास श्रावण पाळणारं गाव, मंदिरातून दिसते शिखर शिंगणापूरची झलक!
Shravan 2023 : आपल्या देशातल्या प्रत्येक राज्याचं काही ना काही खास वैशिष्ट्य आहे. राजस्थानाला ऐतिहासीक तर केरळला देवभूमी म्हटलं जातं. तसंच आपल्या महाराष्ट्राला पुरोगामी राज्य म्हटलं तर वावग ठरणार नाही. महाराष्ट्रात अनेक संत होऊन गेले. त्यांचे विचार जूने झाले म्हणजे ते मागे पडले असे नाही. तर त्याच संत महाराजांनी रूजवलेले विचार आजही श्रद्धेने पाळले जातात.
जिथ लोक श्रावण कधी संपतोय अन् आपण कधी मटणावर तुटून पडतोय असा विचार करत आहेत. तर अशात नेहमीच श्रावण पाळणारे एक गाव आहे. ज्या गावातील लोक मासांहार करणे तर सोडाच पण त्याचा विचारही करत नाहीत. हे काही विशिष्ट महिना किंवा वर्षभराच्या रितीप्रमाणे नाही. तर जन्म झाल्यापासून मृत्यूपर्यंत या गावातील लोक मासांहार करत नाहीत.
हे गाव आहे सांगली जिल्ह्यातील विटा तालूक्यातील रेणावी. या गावातील लोक मांसाहारापासून दूर असतात. ते केवळ या गावची प्रथा आहे म्हणूनच. या गावात नवनाथांपैकी एक असलेले श्री रेवणसिद्ध महाराजांचे भव्य मंदिर आहे. (Sangli)
देवस्थान प्रशस्त असून बांधकाम पूर्णपणे दगडांमध्ये करण्यात आलेलं आहे. डोंगरदऱ्या आणि दाट वनराईने हा परिसर वेढलेला आहे. इथे कधी-कधी कोल्हा, काळवीट, हरीण अशा वन्यप्राण्यांचेही दर्शन होते.
सह्याद्री पर्वतावर असलेल्या डोंगररांगांची सुरूवात खानापूर तालुक्यापासून होते. त्यापैकी ‘रेवागिरी’ नावाची डोंगररांग विटा शहरापासून पूर्वेस सुरू होते. विटा शहराच्या पूर्वेस नऊ किलोमीटर अंतरावर कऱ्हाड-विजापूर रस्त्यावर दक्षिणेस रेणावी गाव आहे आणि इथेच श्री रेवणसिद्ध हे पवित्र तीर्थक्षेत्र आहे.
या वेगळ्या प्रथेबद्दल ग्रामस्थ सांगतात की, श्री रेवणसिद्ध हे मूळ पंचाचार्य पीठ आहे. रेवणसिद्ध हे नवनाथांपैकी एक आहेत. नवनाथ हे पूर्ण शाकाहारी होते. ग्रामदैवत नाथ महाराज असल्याने गावातल्या लोकांना कधीही काही कमी पडत नाही. देवांची अखंड शक्ती सकारात्मक उर्जा गावात नेहमी जाणवते. गावात कधीही भांडण-तंटे होत नाहीत. देवांसाठी आम्हीही हे संपुर्ण शाकाहाराचे व्रत केले आहे, असेही ग्रामस्थ सांगतात. (Shravan)
एखाद्याचे लग्न ठरवतानाही त्याबाबत लग्नाची बोलणी केली जाते. शाकाहारी असलेल्या कन्येची निवड केली जाते. किंवा तशी कल्पना नववधूला देऊन मगच लग्नाची सुपारी फुटते. गावात सर्व धर्मांचे लोक राहतात. प्रत्येकाने ही परंपरा जपली आहे. तिथे राहणाऱ्या ग्रामस्थांना याचं नवल वाटत नाही. ते श्रद्धा म्हणून या गोष्टी मनोभावे पाळतात.
रेवणसिद्धाची यात्रा महाशिवरात्रीपासून सुरू होते. दक्षिण महाराष्ट्रातील सर्वांत मोठी यात्रा इथे भरते आणि त्या यात्रेमध्ये लाखो रुपयांची उलाढाल होते. मंदिराच्या उत्तरेकडील प्रवेशद्वारातून दुर्बिणीतून पाहिल्यास शिखर शिंगणापूरचं दर्शन होतं, असं सांगितलं जातं. मंदिराच्या पूर्वेला एक किलोमीटर अंतरावर गायमुख आहे. रेवणसिद्ध मूर्तीसमोर भव्य असा नंदी आहे. (Temples)
दगडी गुंड
मंदिरात नंदीमहाराजांसमोर एक दगड आहे. त्याला गुंड्या म्हणतात. हाताच्या तीन बोटांनी तो दगड उचलला जातो. असं म्हणतात की, मनात असलेली इच्छा पूर्ण होणार असेल तर तो दगड तीन बोटात अलगद उचलतो. पण जर इच्छा पूर्ण होणार नसेल तर मात्र तो दगड जागचा हालतही नाही.
anmashtami 2023 : कोल्हापुरातल्या या गावात वर्षातून दोनवेळा साजरी होते दहीहंडी; गावात श्रीकृष्णांनी केला रंभेचा उद्धार!
Janmashtami 2023 : श्रीकृष्णांची मंदिरे जशी भारतात आहेत तशी ती परदेशातही आहेत. कृष्णभक्तीचा प्रसार जगभर झाला आहे. अनेक देशात कृष्णांचे भक्त आहेत. दरवर्षी भारतात असलेल्या इस्कॉन मंदिरात परदेशातील भाविकही येतात. नाचतात गातात कृष्णभक्तीत तल्लीन होतात.
जगतकल्याणासाठी देव मनुष्यरूपात जन्म घेतात. देव असूनही यशोदामातेचा मार खातात, गोपिकांचे दही चोरतात. प्रसंगी गोवर्धन उचलून प्रजेचे रक्षण करतात. आणि जगतकल्याणासाठी भ्रमण करतात. आज श्रीकृष्ण जन्माष्टमी आहे. कृष्ण भक्तांसाठी आज जणू दिवाळी अन् दसरा होय.
कृष्णाने अनेक ठिकाणी जाऊन राक्षसांचा वध केला. गावांचा, लोकांचा उद्धार केला. तसेच ते एकदा करवीर क्षेत्राकडे आल्याचे उल्लेख पुराणांमध्ये आहेत. या विषयी हरिवंशपुराण आणि करवीर महात्म्य या दोन ग्रंथांत फार सुंदर उल्लेख मिळतात.
करवीर महात्म्य उल्लेखाप्रमाणे भगवान श्रीकृष्ण दोन वेळेला कोल्हापुरात आले एकदा बलरामा सोबत कालयवन वधासाठी आणि दुसऱ्या वेळी आपल्या सोळा सहस्त्र स्त्रियांच्या मानसिक पापाच्या परिवारासाठी. हरिवंशात मात्र भगवान एकदाच कोल्हापुरात आले तेही कालयवन राक्षसाच्या वधावेळेला असा उल्लेख आढळतो.
जावयाचा वध केला म्हणून बदला घेण्यासाठी कंसाचे सासरे जरासंधाने कृष्णाला मारण्यासाठी कालयवन या राक्षसाला पाठवले होते. कालयवन हा जरासंधाने बोलावलेला दुष्ट सेनापती होता. लेकीच्या पतीची हत्या केली म्हणून जरासंधाने श्रीकृष्णाचा सूड घेण्याच्या उद्देशाने सतरा वेळेला मथुरेवर आक्रमण केले होते. सतरा वेळा तो पराजित ही झाला पण मथुरेचे अतोनात नुकसान झाले. अठराव्या वेळी मात्र त्याने कालयवन नावाच्या दुष्ट दैत्याला पाचारण केले.
हा दैत्य गांधार देशाच्या पलीकडून आला असा उल्लेख आहे. अशा कालयवनाला रणांमध्ये लढण्याचा दांडगा अनुभव होता. त्यामुळे सर्व मथुरावासी यांनी भगवंतांना सांगितले की कालयवनाचे वैर हे तुमच्याशी आहे मथुरेच्या बाकी जनांशी नाही तेव्हा योग्य तो निर्णय करा. (Lord Krishna)
भगवंतांनी युद्धाला आव्हान दिले आणि आपला रथ कालयवन त्याच्यासमोर येऊन उभा केला. कालयवनाला बघून भगवान रथातून उतरले आणि रणातून पळत सुटले असा उल्लेख आहे. यामुळेच भगवान श्रीकृष्णाला रणछोड असे नाव मिळाले. भगवंतानी रण सोडलं खरं पण त्यांनी असे केले कारण त्या राक्षसाला मथूरेपासून दूर न्यायचे होते.
सह्याद्री पर्वताच्या घनघोर करण्यामध्ये दैत्याला आव्हान दिले. श्रींचा पाठलाग करत दैत्य कोल्हापुरजवळच्या विशाळगडाच्या पाठीमागे असलेल्या मुचकुंद नावाच्या राजाच्या गुहेत शिरला. मुचकुंद राजाला वरदान होते की जो कोणी त्यांची झोप मोडेल तो जळून भस्म होईल.भगवंत गुहेत आले आणि त्यांनी आपला शेला मुचकुंद राजावर पांघरला कालयवनाने रागाने कृष्ण समजून मुचकुंदाची झोपमोड केली. आणि तो जळून भस्म झाला.
करवीर महात्म्य आपल्या कथेप्रमाणे इथे येताना भगवान श्रीकृष्णांनी गाय रुपी रंभेचाचा उद्धार केला. तो परिसर म्हणजे केखले आणि जाखले. तसंच कालयवनाबरोबर युद्ध करताना भगवंताने मारलेल्या उडी मुळे पर्नाळपर्वत दोन योजन खाली आला असा उल्लेख आहे. (Janmashtami)

जाखले मंदिरातील सभामंडपesakal
आजही जाखले गावात हे गोपालेश्वराचे मंदिर आहे. पुढे करवीर महात्म्यातल्या कथेप्रमाणे भगवान श्रीकृष्णाच्या सोळा सहस्त्र राण्यांच्या हातून काही मानसिक पाप घडले त्याची निष्कृती करायला भगवान आपल्या परिवारासह करवीरात आले.
जाखले गावातील ग्रामस्थ लक्ष्मण देशमुख यांनी दिलेल्या माहितीनुसार, जाखले गावात गोपालेश्वर हे मंदिर आहे. त्याची कथा अशी सांगितली जाते की, मोकळ्या माळावर एका निर्जनस्थळी महादेवांचे शिवलिंग होते. ते कोणालाच माहिती नव्हते. माळरानावर असंख्य गायी चारण्यासाठी गोपाळ यायचे. तेव्हा गोपाळांनी आणलेल्या गायी महादेव असलेल्या जागी जाऊन पान्हा सोडत होत्या. त्या दुधाने महादेवांना अभिषेक करायच्या.
गायींचे असे पान्हा सोडणे आश्चर्यजनक होते. त्यामुळे त्याजागी शोधले असता तिथे महादेवांची पिंड असल्याचे लक्षात आले. तेव्हा त्या शिवलिंगाच्या जागी मंदिर उभारण्यात आले.

मंदिरातील गाभाऱ्यातील शंकरांची मूर्ती आणि शिवलिंगesakal
करवीर महात्म्यात श्रीकृष्णांनी जाखले या गावचा उद्धार केल्याचे उल्लेख आहेत. त्यामुळेच या मंदिरात कृष्णांचा जन्मकाळ सोहळा होतो. यानंतर गावात दहीहंडी असते. तर दिवाळीत येणाऱ्या तुलसी विवाहानंतर या गावची यात्रा असते. तेव्हाही या गावात दहीकाला साजरा होतो. यात्रेवेळी देवांची पालखी जेव्हा गावातील पारावर येते.
तेव्हा तिथे असलेल्या मोठ्या झाडाला दह्याने भरलेली हंडी बांधली जाते. देवांची पालखी झाडाखाली आली की, दह्याने भरलेली हंडी फोडून पालखीवर अभिषेक होतो. वर्षातून दोनवेळा दहीहंडीचा उत्सव या गावातील भक्तांना अनुभवता येतो.
जाखले गावामध्ये श्रीकृष्ण जन्माष्टमीचा कार्यक्रम गोपालेश्वर मंदिर तसेच मानेवाडा येथे परंपरागत चालू आहे तसेच दहीहंडीचा कार्यक्रम सुद्धा वैकुंठ चतुर्थी आणि श्रीकृष्ण जन्माष्टमी या दिवशी गावामध्ये चौगुले कदम समाजातर्फे साजरा केला जातो
( संबंधीत लेख इतिहास संशोधन ॲड.प्रसन्न मालेकर यांनी दिलेल्या माहितीवरून घेतला आहे)

गावातील तुलसीविवाह अन् पालखी esakal
आश्चर्यम्! भारतातल्या या मंदिरात आहे दिवसातून तीनवेळा रंग बदलणारे शिवलिंग!
Shravan 2023 : भारतात अनेक प्राचीन मंदिरे आहेत. ज्यांच्याशी संबंधित रहस्ये अनेक शतकांपासून लोकांना आकर्षित करत आहेत. आज श्रावणाचा तिसरा सोमवार आहे त्यानिमित्तानेच आज आपण अशा एका मंदिराबाबत जाणून घेणार आहोत जिथे रोज एक चमत्कार घडतो.
एक अनोखे मंदिर राजस्थानच्या धौलपूरमध्ये आहे. चंबळ नदीच्या खोऱ्यात वसलेले हे शिवमंदिर ‘अचलेश्वर महादेव’ मंदिराच्या नावाने ओळखले जाते. असे म्हणतात की या मंदिरात असलेले शिवलिंग दिवसातून तीन वेळा आपला रंग बदलते. (Rajasthan achaleshwar mahadev temple)
हे मंदिर डोंगराळ भागात वसलेले असल्यामुळे पूर्वी येथे मोजकेच लोक येत असत, पण हळूहळू मंदिराची माहिती मिळताच येथे भाविक येऊ लागले आणि श्रावण महिन्यात येथे विशेष पूजाही सुरू होते.
जगभरात शिवभक्त असून ते महाशिवरात्रीच्या दिवशीही येथे गर्दीचा महापूर उसळतो. भक्त इथे भोलेनाथांचे दर्शन घेऊन त्यांच्यावर अभिषेकही करतात. इथे अभिषेक केल्याने इच्छा पूर्ण होतात, अशी भाविकांची श्रद्धा आहे.
येथे भगवान शंकराच्या अंगठ्याची पूजा केली जाते असे इतिहासकार सांगतात. गर्भगृहातील शिवलिंग हे पाताळातल्यासारखे दिसते. ज्याच्या वर एका बाजूला पायाच्या बोटाची खूण कोरलेली आहे, ज्याची स्वयंभू शिवलिंग म्हणून पूजा केली जाते. देवाधिदेव महादेवाच्या उजव्या पायाच्या अंगठ्याचे प्रतिक मानले जाते.
अचलेश्वर मंदिर पंधराव्या शतकात बांधले आहे. मेवाडचा राजा राणा कुंभ याने अचलगड किल्ला एका टेकडीवर बांधला. या किल्ल्याजवळच अचलेश्वर मंदिर आहे, तिथे परमेश्वराच्या शिवलिंगाखाली नैसर्गिक खड्डा आहे. या खड्ड्यात कितीही पाणी टाकले तरी तो भरत नाही. त्यात दिलेले पाणी कोठे जाते हे अद्याप एक गूढ आहे. (Shravan 2023)
हे शिवलिंग दिवसातून ३ वेळा रंग बदलते. सकाळी शिवलिंग निळसर रंगाचे, दुपारी भगवे आणि रात्री शिवलिंग काळ्या रंगाचे दिसते. असे का घडते हे आजपर्यंतचे रहस्य आहे.
भोले भंडारी भक्तांच्या इच्छा करतात पूर्ण
असे म्हणतात की या गूढ शिवलिंगाच्या दर्शनाने माणसाच्या सर्व मनोकामना पूर्ण होतात आणि जीवनातील सर्व प्रकारचे संकट दूर होतात. जीवनात कोणतीही समस्या असली तरी या मंदिरात गेल्यावर त्यातून आराम मिळतो. या महादेवाच्या मंदिराविषयी अशी श्रद्धा आहे की अविवाहित मुला-मुलींना शिवलिंगाचे दर्शन घेतल्याने त्यांना इच्छित जीवनसाथी मिळतो.
भगवान शंकराला जल अर्पण करण्यासाठी सोमवारी येथे मोठी गर्दी जमते. अविवाहितांनी १६ सोमवारी येथे जल अर्पण केल्यास त्यांना इच्छित जीवनसाथी मिळतो. याशिवाय शिवाच्या कृपेने विवाहातील अडथळेही दूर होतात.
anmashtami 2023 : या मंदिरात आहे जिवंत कृष्णांची मूर्ती; इंग्रज अधिकाऱ्यानेही केलीय शहानिशा
Janmashtami 2023 : भारतात अनेक मंदिरे आहेत आणि प्रत्येक मंदिरात एक रहस्य दडलेले आहे. असेच एक श्रीकृष्णाचे मंदिर आहे ज्याचे रहस्य आजही उलगडलेले नाही. या मंदिरात असलेली श्रीकृष्ण भगवानांची मूर्ती जिवंत आहे. हे केवळ धार्मिक नाहीतर वैज्ञानिकदृष्ट्याही सिद्ध झाले आहे.
भगवंतांची ही मूर्ती जिवंत असल्याची खात्री खुद्द एका इंग्रज अधिकाऱ्यानेही केली आहे. ते कोणते मंदिर अन् हा नक्की काय प्रकार आहे हे पाहुयात.
राजस्थानमधील जयपूरमध्ये भगवान गोपिनाथांचे एक मंदिर आहे. या मंदिरामध्ये दररोज लाखो लोक त्या ठिकाणी येतात नतमस्तक होतात. गोपीनाथाच्या पायाशी नतमस्तक होतात. हे मंदिर भगवान श्रीकृष्णाचे आहे.
असं सांगितलं जातं की, मुघल जेव्हा मथुरेत आक्रमण करायला येणार होते. त्यावेळी काही भक्तांनी श्रीकृष्णांची ही मूर्ती तिथून पळवून राजस्थानात नेली. ही तीच मुर्ती आहे आणि त्या लोकांनी भगवंताचे मंदिर उभारले आहे.
कसं समजलं की मूर्ती जिवंत आहे
एखादा व्यक्ती जिवंत आहे हे त्याचे पल्स रेट पाहून सांगितले जाते. तसेच, एकेदिवशी एका भक्ताने कान्हाला अलंगन दिलं अन् त्याला श्रीकृष्णांच्या हृदयाचे ठोके ऐकू आले. त्या व्यक्तीने बऱ्याच लोकांना सांगितलं की गोपीनाथाच्या मूर्तीतून हृदयाच्या ठोक्यांसारखा आवाज येतोय. यावर अनेक लोकांनी कान्हाला अलिंगन देऊन हा आवाज ऐकला.
या गोष्टीची वार्ता संपूर्ण शहरांमध्ये वाऱ्यासारखी पसरली. त्यावेळी लोकांची दर्शनासाठी गर्दी झाली. त्याकाळात इंग्रजांच राज्य होतं. शहरामध्ये एक इंग्रज अधिकारी होता त्या इंग्रज अधिकाऱ्यापूर्वी बातमी पोचली. इंग्रज हे देवी देवतांना न मानणाऱ्या ते विज्ञानाला मारणारे होते. परंतु ही बातमी कळल्यानंतर खरी शहाणा-या करण्यासाठी तो इंग्रज अधिकारी आपल्याबरोबरच सोबत शिपायांना घेऊन त्या ठिकाणी पाहोचला.
देवांच रूप पाहून तो अधिकारी भारावून गेला. तो नतमस्तक झाला ना पाया सुद्धा पडला. पण, खरंच ही मूर्ती जिवंत आहे का? अशी शंका त्याच्या मनात आली. त्या शंकेचे निरसन करण्यासाठी त्या अधिकाऱ्याने त्याच्या हातातील पल्सवर चालत असलेलं घड्याळ काढलं. अन् मुर्तीच्या हातात घातलं. तेव्हा चमत्कार घडला, ब्रिटीश अधिकाऱ्याचे ते घड्याळ देवांच्या हातातही सुरू झालं. (Janmashtami)

हातात घड्याळ असलेली भगवंतांची मूर्तीesakal
या घड्याळाचं वैशिष्ट्य असे की, ते केवळ जिवंत व्यक्तीच्या हातात चालू राहते. हातातून बाजूला गेल्यास ते बंद पडते. हे घड्याळ भगवंतांच्या हातात जाताच सुरू झाले. आजतागायत त्या मुर्तीला असलेले ते घड्याळ सुरू असून भक्तांना याचे आप्रुप वाटतं.
या घटनेनंतर अनेक पिढ्या संपल्या, नव्याने जन्माला आल्या पण मुर्तीच्या हृदयाचे ठोके अन् हातातील घड्य़ाळ सुरूच आहे. म्हणजेच भगवंतांचे वय इतके होऊनही ते अमर आहेत.
आज सुद्धा जयपुर मध्ये गोपीनाथांची सकाळची पूजा करतात. त्यावेळेला ते घड्याळ उतरवले जातात नवीन कपडे घालतात त्यावेळेस ते घड्याळ बाजूला काढले जातात बंद होतं आणि पुन्हा ते मूर्तीला घातले जाते तेव्हा ते सुरू होते. हा चमत्कार रोजच पहायला मिळतो.
जयपूरच्या गोपीनाथ मंदिरातील श्रीकृष्णाच्या मूर्तीशी संबंधित ओळख असे मानले जाते की गोपीनाथजी श्रीकृष्णाची मूर्ती ही मूळ मूर्ती आहे. ही मूर्ती स्वतःच प्रकट झाली आहे ती कोणत्याही कारागिराने बनवली नाही. (Shri Krishna)

गोपिनाथ मंदिरesakal
Shravan Somwar 2023 : दर बारा वर्षांनी या मंदिरावर पडते वीज; शिवलिंगासोबत घडतो चमत्कार
Shravan Somwar 2023 : आपल्या देशात भगवान शंकराची अनेक मंदिरे आहेत. त्या प्रत्येक मंदिराची काहीतरी पौराणिक कथा आहे. कधी कुठल्या मंदिरात चमत्कार घडतो, तर कधी भाविकांना काहीतरी अद्भुत अनुभवायला मिळतं.
आत श्रावणाच्या पहिल्या सोमवार निमित्त आपण अशा एका खास मंदिराबद्दल जाणून घेणार आहोत. जिथे दर बारा वर्षांनी एक चमत्कार घडतो. देवभूमी हिमाचल प्रदेशमध्ये हे मंदिर आहे.
हिमाचल प्रदेश हे एक सुंदर पर्वतीय राज्य आहे. जे आपल्या नैसर्गिक आश्चर्यआणि समृद्ध संस्कृतीपासून सुंदर घरे आणि प्राचीन वास्तूंपर्यंत अनेक गोष्टींसाठी ओळखले जाते. याच प्रदेशात बिजली महादेव या नावाने ओळखले जाणारे हे मंदिर २४६० मीटर उंचीवर असलेल्या कुल्लू खोऱ्यातील कश्वरी या सुंदर गावात आहे.
या मंदिरात पवित्र असे शिवलिंग आहे. भारतातील सर्वात प्राचिन मंदिरांमध्येही याची गणना होते. चला तर मग आम्ही तुम्हाला बिजली महादेव मंदिराबद्दल सांगतो.
या मंदिरातील शिवलिंगावर दर १२ वर्षांनी वीज पडते. हे गूढ अद्याप कोणालाही समजलेले नाही आणि वीज पडण्याच्या या घटनेमुळे शिवलिंगाचे तुकडे झाले आहेत. मंदिराचे पुजारी प्रत्येक तुकडा गोळा करतात.
डाळीचे पीठ आणि ताज्या लोण्यापासून बनवलेल्या मिश्रणाने हे शिवलिंग पुन्हा चिटकवतात. यामुळे भंग झालेले शिवलिंग पुन्हा एकजीव होते. काही महिन्यांतच ते शिवलिंग पूर्वीसारखेच दिसू लागते.
स्थानिकांच्या म्हणण्यानुसार, शिवलिंगावर वीज कोसळणाऱ्या कोणत्याही अनिष्ट गोष्टींपासून परिसरातील रहिवाशांचे रक्षण करण्याची इष्टदेवतेची इच्छा आहे. काही लोकांचा असा विश्वास आहे की वीज हा एक दैवी आशीर्वाद आहे ज्यात विशेष शक्ती आहेत.
यामागील पौराणिक कथा काय आहे
असे म्हटले जाते की, एकदा कुल्लूच्या खोऱ्यात कुलंत नावाचा राक्षस राहत होता. एके दिवशी त्याने आपले रूप एका महाकाय सापात बदलले आणि संपूर्ण गावात रेंगाळत लाहौल-स्पीतीमधील माथान गावात पोहोचला. यासाठी त्यांनी ब्यास नदीचा प्रवाह रोखण्याचा प्रयत्न केला.
ज्यामुळे गावात पूर स्थिती निर्माण झाली होती. यावर भगवान शिव राक्षसाकडे पाहत होते, रागाच्या भरात महादेवांनी त्याच्याशी युद्ध करून त्याचा वध केला. शिवाने राक्षसाचा वध केल्यावर त्यांचे रूपांतर एका विशाल पर्वतात झाले आणि या शहराचे नाव कुल्लू असे पडले. असे मानले जाते की भगवान शंकराच्या आज्ञेने इंद्रदेव दर 12 वर्षांनी या पर्वतावर वीज पाडतात.
असंही म्हणतात की, शिवलिंगाला कान लावून ऐकल्यास पाण्याचा आवाज येतो. या पर्वताच्या बाजूने वाहत असलेल्या पर्वती नदीचाच हा आवाज येतो, अशी भाविकांची श्रद्धा आहे.
मंदिरात कसे पोहोचावे
हे मंदिर कुल्लूपासून सुमारे २० किमी अंतरावर आहे. ३ किमी ट्रेकिंग करून येथे पोहोचता येते. पर्यटकांसाठी हा ट्रॅक एक वेगळी अनुभूती देणारा आहे. दऱ्या आणि नद्यांच्या काही विहंगम दृश्यांचा आनंद घेण्यासाठी हे ठिकाण उत्तम आहे. (Shravan2023)
ag Panchami 2023 : वर्षातून एकदाच उघडतं हे मंदिर, माता पार्वती अन् महादेव शेषनागावर आहेत विराजमान
Nag Panchami 2023 : श्रावण महिन्याचा पहिला सोमवार अन् नाग पंचमी एकाच दिवशी येण्याचा हा दुर्मिळ योग तब्बल १९ वर्षांनंतर घडला आहे. आज मोठ्या उत्साहात नागपंचमी साजरी होत आहे. गावागावात झाडाला झोके अन् त्यांच्या स्पर्धा, तर शहरात मोठ्याप्रमाणात भाविकांना प्रसाद वाटप केले जाते आहे. तर काही गावांना यात्रेचे स्वरूपही आले आहे.
आजच्या या पवित्र दिनानिमित्तच आपण देशभरातील महादेव मंदिरांची माहिती घेत आहोत. त्यामुळेच आज आपण अशा एका मंदिराबद्दल माहिती घेऊयात जे वर्षातून केवळ एकच दिवस उघडलं जातं. हे मंदिर आहे नागचंद्रेश्वराचे.
जगप्रसिद्ध ज्योतिर्लिंग बाबा महाकालेश्वर यांच्या निवासस्थानी, शिखराच्या तिसऱ्या भागात मूर्तीच्या रूपात विराजमान असलेल्या नागचंद्रेश्वराचे दरवाजे मध्यरात्री बारा वाजता उघडण्यात आले. नागचंद्रेश्वराला सिद्धेश्वर असेही म्हणतात. विशेष म्हणजे पलंगावर बसलेल्या शिव परिवाराची जगातील ही एकमेव मूर्ती आहे. (Nagchandreshwar temple of Ujjain )
आणखी एक खास गोष्ट म्हणजे ही मूर्ती वर्षातून एकदाच पाहता येते. म्हणजेच प्रत्येक नागपंचमीला मंदिराचे दरवाजे उघडले जातात. मुर्तीच्या रूपात बसलेले भगवान नागचंद्रेश्वर ध्यानासाठी एकांतात जातात आणि नागपंचमीलाच दर्शन देतात अशी श्रद्धा आहे.
मंदिराच्या पुजार्याने सांगितले की, पूर्वी नागचंद्रेश्वराचे दर्शन वर्षभर होत असे, मात्र अपघाताची भीती पाहता आता वर्षातून केवळ एकच दिवस हे दर्शन घेतले जाते. हे मंदिर 11व्या शतकातील आहे. या मूर्तीची स्थापना 11व्या शतकात करण्यात आली होती, ज्यामध्ये भगवान शिवाला सात फण्यांनी सुशोभित केले जात आहे.
नंदी आणि सिंह ही दोन्ही शिव आणि पार्वतीची वाहने आहेत. श्रीगणेशाची ललितासन मुर्ती, उमाच्या उजव्या बाजूला कार्तिकेयाची मुर्ती आणि माथ्यावर सूर्य-चंद्रही आहेत. भुजंग परमेश्वराच्या गळ्यात आणि बाहूभोवती गुंडाळलेले आहे. त्यांचे दर्शन घेण्यासाठी भाविक मोठ्या संख्येने मंदिरात पोहोचतात.
शिवाची दुर्मिळ मूर्ती
नागचंद्रेश्वर महादेव मंदिरात शिवाची दुर्मिळ मूर्ती आहे. नागचंद्रेश्वर महादेव मंदिर देखील प्रसिद्ध आहे कारण ही जगातील एकमेव मूर्ती आहे जिथे भगवान शिव आणि पार्वती नागाच्या आसनावर विराजमान आहेत. नंदी महाराजांची मूर्तीही येथे आहेत. अशी मूर्ती जगभरातील कोणत्याही शिवमंदिरात दिसत नाही. (Nag Panchami 2023)
पौराणिक कथा
नागचंद्रेश्वर महादेव मंदिराबाबतही प्राचीन कथा प्रचलित आहेत. पंडित राम गुरूंच्या म्हणण्यानुसार तक्षक नागाने भगवान शंकराची खूप तपश्चर्या केली होती.त्यानंतर भोलेनाथ प्रसन्न झाले आणि त्यांनी तक्षक नागाला दर्शन दिले. यावर शिव परिवार विराजमान झाला. शिवभक्त असल्याने तक्षक आजही त्यांच्या तपश्चर्येत मग्न आहेत. तक्षकालाही अमरत्वाचे वरदान मिळाले होते.
भगवान भोलेनाथांच्या तपश्चर्येत कोणताही अडथळा येऊ नये म्हणून वर्षातून एकदा दरवाजे उघडले जातात. याशिवाय दुसऱ्या मजल्यावर दररोज येणाऱ्या भाविकांच्या दर्शनामुळे मंदिराच्या मजबुतीवरही परिणाम होऊ शकतो, असा शास्त्रीय विश्वास आहे, त्यामुळे हे मंदिर वर्षातून एकदाच उघडले जाते. (Temple)
ag Panchami 2023 : नागाच्या या मंदिरांना भेट द्याल तर कालसर्प दोषातून होईल सुटका, नशिबही पालटेल
Nag Panchami 2023 : भारतात नागदेवतेची अनेक प्राचिन मंदिरे आहेत. त्यापैकी काही चमत्कारीक मंदिरे उत्तराखंडमध्ये आहेत. तिथे असलेली ही नागदेवतेची मंदिरे खास आहेत. याच कारण म्हणजे कालसर्प दोषांतून तुम्हाला कायमची मुक्ती मिळवण्याच ठिकाण म्हणजे ही मंदिरे आहेत.
कालसर्प योग काय आहे?
अगदी नावाप्रमाणेच “कालसर्प योग” हा सर्व सौख्य हिरावून घेणारा अत्यंत घातक असा योग आहे. अशा योगास कालसर्प म्हणण्यामागे कारण हे आहे कि कालसर्प योगात राहू व केतू असतात. त्यामुळे सर्व कार्यात अपयश येते. तसेच सर्व प्रकारच्या उत्कर्षांमध्ये अडचणी निर्माण होतात. हा योग बनल्यावर व्यक्तीस अनेक संघर्षातून जावे लागते व अडचणींचा सामना देखील करावा लागतो.
कालसर्प योग हा कुठल्याही व्यक्तीच्या कुंडलीत असू शकतो मग ती व्यक्ती श्रीमंत असो, गरिबीत असो, राजकारणी, नोकरदार किंवा व्यावसायिक असो या भौतिक हुद्यांनी काही फरक त्यात होत नाही.
अशा व्यक्तीला सर्व सुख सुविधा उपलब्ध असल्या तरीही अनेक संकटांना, कष्टाला सामोरे जावे लागते. अशा व्यक्तीला गुप्त शत्रूंचा त्रास, अकस्मात अपघातांना तोंड द्यावे लागते. (Nag Panchami 2023 : mythological mystery or uttarakhand nag temple)
साडेसाती सारखाच मागे लागणारा कालसर्प योगातून सुटका मिळवायची असेल तर उत्तराखंडमधील काही मंदिरांना भेट द्यावी. उत्तराखंडमधील टिहरी जिल्ह्यातील सेम मुखेम, पिंगली नाग मंदिर पिथोरागड, धौलीनाग मंदिर बागेश्वर आणि डेहराडून जिल्ह्यातील नागथाट मंदिरावर भाविकांची प्रचंड श्रद्धा आहे.
सेम मुखेम नागराज मंदिर
टिहरी जिल्ह्यातील सेम मुखेम नागराज मंदिर लाखो भाविकांच्या श्रद्धेचे प्रतीक आहे. हे मंदिर सात हजार फूट उंचीवर आहे. एखाद्याच्या कुंडलीत कालसर्प दोष असेल तर या मंदिरात आल्याने दोष दूर होतो, असे पुराणात म्हटले आहे.
या मंदिराशी अनेक श्रद्धाही जोडल्या गेल्या आहेत. द्वापरयुगात भगवान श्रीकृष्ण चेंडू घेण्यासाठी कालिंदी नदीत उतरले तेव्हा त्यांनी कालिया मर्दन केले. त्यावेळी कालिया नाग याच जिल्ह्यात येऊन राहीला. तेच गे सेम मुखेम येथील मंदिर होय.
त्यानंतर कालिया नागाच्या विनंतीवरून भगवान श्रीकृष्ण द्वारका सोडून उत्तराखंडमधील रामोला गढी येथे आले आणि मूर्तीच्या रूपात त्याची प्रतिष्ठापना केली. कालसर्प दोष दूर करण्यासाठी आणि भगवान श्रीकृष्णाचे दर्शन घेण्यासाठी भाविक या मंदिरात येतात.
पिंगली नाग मंदिर
पिंगली नाग मंदिर उत्तराखंडच्या पिथौरागढ जिल्ह्यातील पानखु गावात आहे. गाई, म्हशींचे पहिले दूध आणि प्रत्येक पिकाचे पहिले दाणे येथील स्थानिक लोक नागदेवतेला अर्पण करतात. नागदेवता त्यांना प्रत्येक संकटातून वाचवतात आणि भक्तांवर आपली कृपा ठेवतात, अशी त्यांची श्रद्धा आहे.
द्वापरयुगात कालिया नागाचा यमुना नदीत भगवान श्रीकृष्णाने पराभव केला, त्यानंतर तो धौलीनाग, बेरीनाग, फेनिनाग, वासुकीनाग, मूलनाग आणि आचार्य पिंगलाचार्य यांच्यासमवेत दशोली, गंगावलीजवळील पर्वत शिखरांवर स्थायिक झाला.
तेव्हापासून स्थानिक रहिवासी पिंगल नागदेवता म्हणून पिंगळाचार्यांची पूजा करू लागले. स्कंद पुराणातील मानसखंडात नागांचे सविस्तर वर्णन आहे. असे म्हटले जाते की, एका ब्राह्मणाला पिंगल नाग देवतेने स्वप्नात येऊन मी इते आहे माझे मंदिर बांध, अशी माहिती दिली होती. याच ब्राह्मणाने डोंगरमाथ्यावर मंदिर बांधून विधिवत पूजा केली. (Temples )
धौलीनाग मंदिर
धौलीनाग मंदिर बागेश्वर येथे असून कालिया नागाचे ज्येष्ठ पुत्र धौलीनाग देवता यांना समर्पित आहे. हे मंदिर विजयपूरजवळील टेकडीवर आहे. प्रत्येक नागपंचमीला मंदिरात जत्रा भरते.
धौलीनागने सुरुवातीला परिसरातील लोकांना त्रास दिला, त्यानंतर लोकांनी त्याची पूजा करण्यास सुरुवात केली. ज्यानंतर धौली नाग देवतेने स्थानिक लोकांचे अनेक नैसर्गिक आपत्तींपासून रक्षण केले आणि त्यांना देवाचा दर्जा देण्यात आला.

धौलीनाग मंदिर,बागेश्वर esaka
ऑफबीट - बाणगंगा तलाव, वाळकेश्वर, मुंबई. ( Banganga Tank, Walkeshwar Temple )
आज मोजक्या मुंबईकरांना क्वचित माहीत असेल की या बेटावर एक गोड्या पाण्याचं तळं आहे. आणि त्या बाजूलाच एक महादेव मंदिरही आहे. या तलावाचा आणि मंदिराचा वारसा थेट रामायण कालावधीला जोडला गेला आहे.
![]() |
| गोमुखातून कोसळणारा पाण्याचा स्तोत्र (Banganga) |
सीतेच्या शोधार्थ श्रीराम या ठिकाणी आले होते. कदाचित दक्षिणेस असलेल्या लंकेत जाण्यासाठी या अरबी समुद्रालगत असलेल्या या बेटांच्या टोकाला ते आले असावेत. इथं आल्यावर त्यांनी बंधू लक्ष्मणाकडे पाण्याची मागणी केली. समुद्रानं वेढलेल्या या बेटावर त्यावेळी पिण्यालायक पाणी मिळणं नक्कीच दुरापास्त असावं. त्यावेळी लक्ष्मणानं या ठिकाणी जमिनीत बाण मारून जल उत्पती केली. हजारो मैलांचा प्रवास करून गंगा अवतरली.
विश्वास ठेवायला ही घटना अतर्क्य वाटते, पण अरबी समुद्रकिनाऱ्यापासून हाकेच्या अंतरावर खाऱ्या पाण्यानं वेढलेलं असूनही एक पिण्यालायक गोड्या पाण्याचा स्त्रोत्र अखंड वाहताना दिसतो. सरासरी पाच हॉर्सपॉवरचं इंजिन खेचू शकेल इतकं पाणी तेरा त्रिकाळ या तळ्यात अव्याहतपणे जमा होताना दिसतं.
![]() |
| श्री वालुकेश्वर (वाळकेश्वर) Walkeshwar Temple |
![]() |
| श्री वालुकेश्वर (वाळकेश्वर) |
बाण मारून प्रकट झालेल्या गंगेस 'बाणगंगा' हे नांव पडलं. दरम्यान श्री रामांनी तिथं वास्तव्य करून शिवलिंगाची पूजा केली. तिथल्या वाळू पासून शिवलिंग तयार केलं. त्यामुळं शिवलिंगास 'वालुकेश्वर' म्हणून ओळखलं जाऊ लागलं. वालुकेश्वरचा अपभ्रंश होऊन आजचं 'वाळकेश्र्वर' झालं. सात हजार वर्षांची परंपरा असलेलं हे बाणगंगा आणि वालुकेश्वर मंदिर बऱ्याच मुंबईकरांना अपरिचित आहे.
![]() |
| आयताकृती बाणगंगा तलाव (Banganga) |
![]() |
| Temple Banganga |
![]() |
| ओंकारेश्वर महादेव मंदिर (Banganga) |
![]() |
| Banganga |
![]() |
| श्री वालुकेश्वर काशी मठ (Banganga) |
![]() |
| नाथ गगनगिरी महाराज ट्रस्टनं बांधलेली पाणपोई (Banganga) |
![]() |
| Banganga Ghat |
तलाव परिसरात प्रामुख्यानं गौड सारस्वत ब्राह्मण वस्ती दिसते. त्यांची टुमदार जुनी कौलारू घरं दिसतात. हा पूर्ण परिसर त्यांच्या अंकित दिसतो. तर बाजूलाच मुंबई महानगरपालिकेचं छोटंसं उद्यान आहे.
![]() |
| गौड सारस्वत ब्राह्मण वस्ती (Banganga) |
![]() |
| दिपमाळा (Banganga) |
![]() |
| Banganga |
![]() |
| गंगा स्नान करणारे भाविक (Banganga) |
![]() |
| गणपती विसर्जन (Banganga) |
![]() |
| Banganga |
तलाव आणि मंदिर परिसराची देखभाल आणि दुरुस्ती मुंबई महानगर पालिकेकडे आहे. तर रस्त्यावर दिवाबत्तीची जबाबदारी 'बेस्ट' च्या विद्युत विभागाकडे आहे. या पुरातन जागेचे महत्व वाढवण्यासाठी 'आर्. पी. गोयंका फाऊंडेशन' या प्रसिद्ध व्यापारी आणि सेवाभावी संस्थेनं रस्त्यावरील विद्यमान विजेचे खांब बदलून ऐतिहासिक दिसणारे खांब बसविण्याचं काम मार्च २०२२ ला घेतलं होतं. या कामासंदर्भात पाहणी आणि कार्यवाही करण्यासाठी 'बेस्ट' वीजपुरवठा विभागातर्फे माझी अधिकारी या नात्यानं बऱ्याचदा तिथं भेट झाली. आणि ऑगस्ट २०२२ ला हे काम पूर्णत्वास गेलं.
![]() |
| घाटावरची कार्ये करणारे ब्राह्मण (Banganga Tank) |
![]() |
| नवीन उभारलेले रस्त्यावरील विजेचे खांब |
ऑफबीट - चिरनेर (Offbeat Chirner)
![]() |
| श्री महागणपती (Chirner) |
![]() |
| गाभाऱ्याच्या चौकटीवरील शिल्प गणेशपट्टी |
![]() |
| श्री महागणपती मंदिर (Chirner) |
सरासरी शंभर वर्षांपर्यंत इथं घनदाट जंगल होतं. स्थानिक आगरी समाज जंगलातून मध, जळाऊ लाकूड, पशुपालन, फळे, रानभाज्या आणि शिकार यावर गुजराण करत. १८७८ च्या जंगल कायद्यात सुधारणा करून १९२७ ला इंग्रजांनी स्थानिकांना जंगलात बंदी घातली. त्यांच्या पोटापाण्याचे हाल होऊ लागले, साऱ्या भारतवर्षात थोड्याअधिक फरकानं स्थानिकांवर हीच वेळ आली. देशभर जंगल सत्याग्रह पुकारला गेला. त्या सत्याग्रहास उरण चिरनेरच्या आगरी जनतेने भरघोस पाठिंबा दिला.
![]() |
| हुतात्मा स्मारक (Chirner) |
अहिंसेच्या मार्गानं चाललेल्या या आंदोलनाला हिंसेचं वळण मिळालं. २५ सप्टेंबर १९३० ला चिरनेरच्या अक्कादेवीच्या माळरानावर ब्रिटिशांनी गोळीबार केला. त्यात काही स्थानिक मारले गेले. घटनेच्या चौकशी दरम्यान चिरनेरचे काही आरोपी ठरवून पकडले. गावात पोलिस चौकी नसल्यानं या गणपतीच्या देवळात त्यांना कोंडून मारहाण करण्यात आली होती.
या घटनेचा निषेध करण्यासाठी गावातील बाळाराम रामजी ठाकूर हा तरुण देवळाजवळ आला. त्यावेळी पोलिसांनी त्याच्यावर गोळीबार केला. बाळारामचा हात जखमी झाला. त्या दरम्यान एक गोळी देवळाच्या लोखंडी गजाला लागली होती. ग्रामस्थांनी या लोखंडी गजाची आठवण आजही जपून ठेवली आहे. देवळात प्रवेश करताना डाव्या बाजूला हा गोळी लागलेला गज सर्वांना स्पष्ट दिसेल असा खिडकीत बंदिस्त करून ठेवलेला दिसतो.
![]() |
| १९३० चा गोळी लागलेला लोखंडी गज |
![]() |
![]() |
| हुतात्मा स्तंभ (Chirner) |
सप्टेंबर २००५ साली तळ्याकाठावर राखीव जागेत हुतात्मा क्रांतीकारकांचे भव्य बोलके पुतळे उभारलेले आहेत. प्रत्येक पुतळ्याखाली त्यांचे नांव, गांव आणि कोणत्या क्षणी त्यांना वीरमरण आलं, त्या क्षणाचा उल्लेख लिहिलेला दिसतो. श्री महागणपतीचा आशीर्वाद घेणारा प्रत्यक भाविक इथं ओढला जातो आणि या हुतात्म्यापुढे नतमस्तक होताना दिसतो.
बाराव्या शतकापासून इस्लामिक आणि त्यानंतर पोर्तुगीजांनी केलेली आक्रमणं आणि जबरदस्तीचं धर्मपरिवर्तन यातून मंदिरं आणि मुर्त्याही सुटल्या नाहीत. मंदिरं तुटली पण त्यावेळच्या पूजाऱ्यांनी मुर्त्या वाचविण्याचा प्रयत्न केला. कुठे तळघरात, विहिरीत, तळ्यात तर कुठे जमिनीखाली मुर्त्या लपविल्या गेल्या. शिवछत्रपतींनी लावलेला स्वराज्याचा वटवृक्ष पेशवेकाळात अगदी अटकेपार फोफावला. पुन्हा देव, देश आणि स्वधर्म वाढीस लागला.
जसे नानासाहेब पेशवे गणेशभक्त होते, तसे उरण प्रांताचे त्यांचे सुभेदार रामजी महादेव फडकेही गणेशभक्त होते. धर्मांतरासाठी छळणाऱ्या पोर्तुगीजांचा त्यांनी चांगलाच समाचार घेतला. त्यांनी उरण, पाली पोर्तुगीज मुक्त केली. त्यांना तळ्यातल्या गणेशाचा दृष्टान्त झाला आणि या महागणपतीची पुन्हा स्थापना झाली.
तळ्याकाठावर श्री महागणपती मंदिर बांधलं. मंदिराच्या पूर्वेस असलेल्या तळ्यास 'देवाचं तळं' नांव पडलं. पाच फुट उंचीची श्री महागणपतीची सिंदूरचर्चित मूर्ती पूर्वाभिमुख आहे. महडचा स्वयंभू श्री वरदविनायक आणि या मूर्तीत बरंच साम्य दिसतं. मूर्ती इतकी प्रसन्न, सुंदर आणि सुरेख आहे की, बघताक्षणी भाविक सुखावून जातो. गाभाऱ्यासमोर उंच पितळी रेखीव स्तंभावर मोठा नक्षीदार मूषक श्री महागणपतीकडे तोंड करून दोन पायावर उभा आहे.
![]() |
![]() |
| गाभाऱ्यासमोरील पितळी मूषक |
![]() |
| मंदिराचं नवीन बांधलेलं सभामंडप (Chirner) |
मंदिराचा गाभारा दगडी असून, अंतराळ गोल घुमटाकार आहे. गाभाऱ्याच्या चौकटीवर दगडात कोरलेली गणेशपट्टि दिसते. गाभाऱ्यावर पितळी कळस दिसतो. गाभाऱ्याच्या चार कोपऱ्यात चार चबुतरे ठेवलेले दिसतात. सध्या मूळ गाभाऱ्याला बाहेरून प्लास्टर केले असून, पूर्ण मंदिराला आतून बाहेरून उठावदार रंग लावलेला दिसतो. पुढे कालांतरानं गाभाऱ्यापुढील सभामंडप बांधलेला दिसतो.
या सभामंडपास लागूनच नजीकच्या काळात आणखी एक भव्य, प्रशस्त मंडप बांधलेला दिसतो. हा नवीन सभामंडप इतका प्रशस्त आहे की, गावातील लग्न आणि इतर शुभकार्य इथं केली जातात. तळ्याकाठच्या या मंदिरासमोर प्रशस्त समतल मोकळी जागा दिसते. मंदिराच्या उजवीकडे दक्षिणेला जुनं कौलारू मारुती मंदिर दिसतं.
तळ्याकाठावरच गणपती मंदिरासमोर पुरातन श्री शंभू महादेवाचं मंदिर आहे. मंदिराचा सभामंडप नजीकच्या काळात बांधलेला दिसतो. गाभारा लहान असला तरी, गाभाऱ्याच्या उजवीकडे दिवडीत गणेश तर डावीकडील दिवडीत कार्तिक स्वामींची सुबक मूर्ती दिसते. गाभाऱ्यात शिवपिंडी असून, पिंडीवर कलशातून पडणारी अखंड जलधार दिसते. पिंडीसमोर पाषाणी भिंतीतील दिवडीत माता पार्वती स्थापित दिसते. भिंतीच्या गाभाऱ्यासमोर सभामंडपात पाषाणात घडविलेला नंदी दिसतो.
![]() |
![]() |
| श्री शंभू महादेव मंदिर (Chirner) |
![]() |
| गद्धेगळ (Chirner) |
![]() |
| नंदी |
इ. स. १७३९ ला वसईच्या स्वारीवर निघताना चिमाजि आप्पांनी या महागणपती आणि शंभू महादेवाचे आशीर्वाद घेतल्याची माहिती गावात मिळते.
![]() |
| शिवलिंग आणि मागे माता पार्वती (Chirner) |
या भव्य तळ्याला एकूण चार दगडी घाट आहेत. काही स्थानिक घाटावर झाडांच्या सावलीत मासेमारीसाठी पाण्यात गळ टाकून बसलेले दिसतात.
![]() |
| मासेमारी करणारे स्थानिक (Chirner) |
![]() |
| देवाचं तळं (Chirner) |
![]() |
| देवाचं तळं - डावीकडे महादेव आणि समोर महागणपती मंदिर (Chirner) |
चिरनेर गावात मातीची भांडी तयार करून येणाऱ्या भाविक आणि पर्यटकांना विकण्याचा व्यवसायही दिसतो. त्यासाठी लागणारी माती इथल्या शेतातून काढली जाते. माती काढल्यानंतर तयार झालेल्या खड्ड्यात पाणी साठवून शेततळी तयार करतात. या शेततळ्यात मस्त्योद्योग करताना स्थानिक दिसतात.
![]() |
| पोपटी पार्टीचा आस्वाद घेताना महिला मंडळ (Chirner) |
![]() |
| भांडी विकणारी चिरनेर ची भगिनी |
![]() |
| मातीची भांडी बनवताना (Chirner) |
तुळजापूर येथील श्री तुळजाभवानी देवी च्या संदर्भात काही महत्वपूर्ण माहिती
तुळजापूर येथील या प्रकरणामुळे मंदिरांच्या धार्मिक विधींत शासकीय हस्तक्षेप होण्याचा नवा पायंडा पडू पहात आहे; कारण तुळजापूरनंतर २१ जानेवारी २०११ या दिवशी पंढरपूर येथील विठ्ठल-रखुमाई मंदिरांतील मूर्तींवरील अभिषेकही हेच कारण देऊन शासनाकडून थांबवण्यात आला. देवस्थानांच्या धार्मिक विधींमधील हा शासकीय हस्तक्षेप आजच न रोखल्यास पुढे महाराष्ट्रात आणि त्याही पुढे देशभरात सर्वत्रच्या देवस्थानांमधील मूतींवरील अभिषेकही थांबेल. हळूहळू धर्मद्रोही शासन हिंदूंच्या धर्मश्रद्धेचे स्थान असलेल्या ‘मंदिरांत काय असावे आणि नसावे ?’, हेही ठरवू लागेल आणि तेथे शासनाची धर्मद्रोही धोरणे राबवली जातील; म्हणून धर्मश्रद्धेच्या रक्षणार्थ देवस्थानांमधील शासकीय हस्तक्षेपाला विरोध करणे, हे प्रत्येक हिंदूचे कर्तव्य ठरते !
----
संपूर्ण महाराष्ट्राचे कुलदैवत आणि छत्रपती शिवाजी महाराजांची कुलस्वामिनी म्हणून अनादी काळापासून सर्वांना परिचित असलेली तुळजापूर येथील श्री भवानीदेवी !
या देवीची पूजा आणि आराधना संपूर्ण महाराष्ट्रासह आंध्रप्रदेश, कर्नाटक, मध्यप्रदेश, गुजरात या राज्यांसह संपूर्ण भारत देश करतो. श्री भवानीदेवीच्या पूूजाविधीमध्ये अनेक प्रकारचे पूजाविधी अनादी काळापासून चालत आलेले असून आपल्या नवसाप्रमाणे हे पूजाविधी करण्याची पद्धत आहे. हे विधी करण्यामागे श्री देवीचा कुलाचार करणे, कुलदेवतेला प्रसन्न करणे आणि घरात आरंभलेले शुभकार्य पार पाडणे इत्यादी अनेक उद्देश असतात.
या सर्व पूजाविधींमध्ये प्रमुख आणि मोठ्या प्रमाणावर केला जाणारा पूजाविधी म्हणजे ‘भोगी अभिषेक’! यामध्ये दही, दूध, केळी, साखर आणि लिंबू इत्यादी पदार्थ मूर्तीस लावून भक्तांना ते प्रसाद म्हणून परत दिले जातात. भक्त पंचामृत म्हणून ते ग्रहण करतात.
१. पूजाविधी करण्यामागील पूर्वापार चालत आलेला उद्देश : भक्तांकडून आणलेल्या साहित्याच्या माध्यमातून कुलदेवतेच्या मूर्तीची जोपासना, राखण व्हावी आणि तिची सुंदरता टिकून रहावी, हा उद्देश असतो. दूध, मध, लिंबू, दही आणि साखर या घटकांमधील तत्त्वाने देवीच्या मूर्तीच्या गंडकी पाषाणाला चांगला उजाळा येऊन मूर्ती सुंदर अन् आकर्षक दिसते. हे पदार्थ वापरल्यामुळे कोणत्याही प्रकारची झीज होत नाही. या मिश्रणातून अतिशय चांगले जीवनसत्त्व असणारा पदार्थ निर्माण होतो आणि भक्तांनी तो ग्रहण केल्यास त्याला न मिळणारी जीवनसत्त्वे मिळतात. अशा प्रकारे देवीच्या मूर्तीचे रक्षण आणि भक्त यांचा विचार करूनच हा पूजाविधी अनादी काळापासून चालू आहे.
२. ‘भोगी’ पूजाविधी करण्याची पद्धत
अ. पूजाविधी करतांना प्रथम देवीच्या अंगावरील सर्व वस्त्रे काढली जातात. त्यानंतर थंड पाण्याने संपूर्ण मूर्तीची स्वच्छता केली जाते.
आ. स्वच्छतेच्या वेळी वापरण्यात येणारा कुंचला वाळ्याच्या मुळ्यांपासून बनवलेला असतो. वाळ्याच्या मुळ्या अतिशय मऊ आणि सुगंधी असतात अन् त्यात असलेल्या तत्त्वांमुळे मूर्तीच्या खाचखळग्यात कोठेही अस्वच्छता रहात नाही.
इ. अभिषेक पूजाविधी संपतांना मूर्ती पुन्हा स्वच्छ, थंड पाण्याने धुऊन, मऊ कापडाने पुसून स्वच्छ केली जाते.
ई. अभिषेकपूजा चालू असतांना कोणत्याही प्रकारच्या गतीमान दबावयुक्त पाण्याचा (प्रेशराईज्ड वॉटर) किंवा रसायनांचा वापर केला जात नाही.
देवीच्या मूर्तीची हाताळणी पुजारी अत्यंत लक्षपूर्वक आणि संपूर्ण सुरक्षिततेची काळजी घेऊनच करतात. आजपर्यंत पूजाविधी करतांना मूर्तीची कोणत्याही प्रकारची झीज झाल्याचे दिसून आलेले नाही. पुजारीवर्गाला देवीच्या मूर्तीची स्वतःच्या जिवापेक्षाही अधिक काळजी असते.
३. गंडकी पाषाणावर पाणी, हवा, रसायन इत्यादींचा परिणाम होत नसल्याने देवीची मूर्ती बनवतांना या पाषाणाची निवड केली जाणे : या मूर्तीच्या संदर्भात इतिहासात नोंद आहे की, गडबडशहावली हसनाबादकर आणि त्या वेळचे देवीचे पुजारी श्री. माधवराव वाळके-सुरवसे पुजारी यांनी आताच्या नेपाळ प्रदेशातील गंडकी नदीच्या पात्रातून अनागोंदी येथील गंडकी पाषाण आणले आणि कुशल पाथरवटांच्या हस्ते त्यापासून मूर्ती घडवून घेतली. या पाषाणावर पाणी, हवा, रसायन इत्यादींचा कसलाच परिणाम होत नाही आणि हे पाषाण अतिशय कणखर असल्याने या पाषाणाचीच निवड केली आहे.
४. अफजलखानाच्या मूर्तीभंजनाच्या कुकृत्यापासून पुजार्यांनी मूर्तीचे संरक्षण करणे : मूर्ती रक्षणाविषयी इतिहासात आणखी एक पुरावा असा आहे की, छत्रपती शिवाजी महाराजांना ठार करण्यासाठी अफजलखान महाराष्ट्रावरच चाल करून आला. त्याने मूर्तीभंजनाचा सपाटा लावला. छत्रपतींना भवानीदेवी साहाय्य करते, तर तिलाच उपद्रव करण्याच्या उद्देशाने त्याने येथेही आक्रमण केले. तेव्हा येथील मूर्ती पुजार्यांनी दुसर्या ठिकाणी नेली आणि देवळात अन्य मूर्ती आणून ठेवली. अफजलखानाने ती मूर्ती फोडून जात्यात भरडून काढली, असा उल्लेख आहे. अशा परिस्थितीतही पुजार्यांनी मूर्तीचे संरक्षण केले.
५. भक्तांना होणार्या आध्यात्मिक लाभापेक्षा मूर्ती टिकवण्याला जास्त महत्त्व देणारे हिंदुद्वेष्ट्या काँग्रेस सरकारचे प्रशासन !
५ अ. शासकीय अधिकार्यांनी मूर्तीची जवळून पहाणी न करताच तिची झीज होत असल्याचा निष्कर्ष काढून ‘भोगी’ पूजा बंद करण्यास सांगणे : अलीकडे मंदिर प्रशासनास जाग आली आणि श्री भवानीमूर्तीची झीज होत असल्याचा साक्षात्कार त्यांना झाला. या संदर्भात सूत्रबद्ध पद्धतीने चक्रे फिरू लागली. देवीच्या मूर्तीविषयी धर्मभावनेचा प्रश्न असलेला ‘भोगी’ पूजाविधी बंद करण्याचा कट शिजू लागला. त्याप्रमाणे संभाजीनगर येथील संबंधित खात्यास प्रशासनाने देवीच्या मूर्तीची पहाणी करून इतिवृत्त (अहवाल) देण्याची विनंती केली. अधिकार्यांनी ३ फूट लांबून मूर्तीची केवळ छायाचित्रे काढली आणि त्या छायाचित्रांवरून या मूर्तीची झीज होत असल्याचा निष्कर्ष काढला आणि ‘भोगी’ पूजा बंद करावी किंवा मूळ मूर्तीस चांदीचे आवरण घालावे, असे सांगितले. केवळ तर्वâवितर्कांवर असे होऊ शकते ? ‘या संदर्भात नागपूर येथील आमच्याशी संबंधित कार्यालयाकडून इतिवृत्त (अहवाल) मागवावा’, असे सांगितले आहे.
६. भक्तांच्या धर्मभावना निरनिराळ्या मार्गाने चिरडून टाकण्यामागे मोठे षडयंत्र कार्यरत असून भवानीदेवीची ‘अभिषकभोगी’ पूजा बंद होऊ नये, अशी समस्त भाविकांची मागणी असणे ! : काही विघ्नसंतोषी, स्वार्थी लोकांनी प्रशासनातील अधिकार्यांच्या साहाय्याने कायदेशीर मार्गाचा अवलंब करून हिंदु भक्तांच्या भावनांचा कसलाही विचार न करता किंवा योग्य पर्यायी उपाययोजना न करता ‘भोगी अभिषेक’ बंद करण्याचे प्रयत्न चालवले आहेत. असे झाल्यास आपल्या कुलदेवतेचा कुलाचार करण्यापासून समाज वंचित राहील. अशा प्रकारे हिंदूंच्या धर्मभावना निरनिराळ्या मार्गाने चिरडून टाकण्याचे प्रयत्न होत आहेत. हिंदूंच्या मोठमोठ्या यात्रा, उत्सव कोणत्या ना कोणत्या कारणांनी बंद पाडण्याचे किंवा न्यून करण्याचे प्रयत्न केले जात आहेत. भक्तांच्या धार्मिक भावना आणि कुलाचार यांचा विचार करता ‘अभिषेकभोगी’ पूजा बंद होऊ नये, अशी कोट्यवधी भाविकांची भावना आहे.’
- श्री. नागनाथ (भाऊ) भांजी (कदम), तुळजापूर
भक्तांना होणार्या आध्यात्मिक लाभापेक्षा मूर्ती टिकवण्याला जास्त महत्त्व देणारे मंदिरशास्त्राचे अभ्यासक ! : ‘गंडकी नदीतील प्रत्येक पाषाणातच देवत्व असते. तो केवळ गोटा असला, तरी त्याचे पूजन करण्याची प्रथा आहे; मात्र त्या पाषाणातून घडवलेली मूर्ती झिजत नाही, असे नाही. घडवलेल्या मूर्तीला टाकीचे घाव बसलेले असतात. त्यामुळे तिच्यामध्ये बारीक छिद्रे असतात आणि त्या छिद्रांमध्ये दही, केळी इत्यादीr राहू शकतात. त्यामुळे घडवलेल्या मूर्तीवर भोग लावणे चुकीचे आहे. शिवलिंगाला भोग लावण्याची प्रथा आहे; मात्र ते शिवलिंग स्वयंभू असावे लागते. अशा स्वयंभू शिवलिंगाची चकाकी वाढते, हे सत्य आहे; मात्र ‘घडवलेल्या मूर्तीवर भोग लावल्याने त्याची चकाकी वाढते किंवा सौंदर्य वाढते’, असे म्हणणे चुकीचे आहे. भोग लावण्याच्या प्रथेला धर्मशास्त्रात आधार नाही.’ - मंदिरशास्त्राचे अभ्यासक श्री. उमाकांत राणिंगा, कोल्हापूर
मूर्ती टिकवण्यापेक्षा भक्तांना तिचा आध्यात्मिक लाभ होणे जास्त महत्त्वाचे !
देवाच्या मूर्ती भक्तांसाठी असतात. मूर्तींसाठी भक्त नाहीत. त्यामुळे मूर्तींची काळजी वहाण्यासाठी भक्तांना मूर्तींचा लाभ होण्यापासून दूर ठेवणे योग्य नाही. त्या पुराणवस्तू संग्रहालयातील वस्तूंप्रमाणे नसतात. मूर्ती शासनासाठीही नाहीत. विविध विधींमुळे मूर्तीची झीज झाली, तर तिचे विसर्जन करून नवीन मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करण्याचे धर्मशास्त्रात सांगितले आहे. यावरून बुद्धीला किती मर्यादा असतात आणि बुद्धीने घेतलेले निर्णय कसे चुकीचे असू शकतात, हे लक्षात येते; म्हणून अध्यात्मशास्त्र शिकण्याला आणि ते जाणून घेण्याला पर्याय नाही.
हिंदु धर्माचा अभ्यास नसणारे, त्यासंदर्भात धर्माधिकार्यांचा सल्ला न मानणारे हिंदुद्वेष्टे काँग्रेस शासन असेपर्यंत सर्वच मंदिरांच्या संदर्भात ही समस्या निर्माण होणार आहे. हिंदूंना मिळणार्या चैतन्याचा स्रोत मिळू नये अन् हिंदु धर्म नामशेष व्हावा, यांसाठी साम्यवादी, बुद्धीप्रामाण्यवादी आणि हिंदुधर्मद्वेष्टे काँग्रेस शासन एकजुटीने सर्व शक्ती पणाला लावून कार्यरत आहेत.
मूर्तीभंजकांविरुद्ध काही न करणारे शासन मूर्तीची झीज थांबवण्यासाठी प्रयत्न करते, हे नाटक आहे. शेकडो वर्षे मूर्तीभंजन चालू असतांना स्वातंत्र्यानंतर सर्वपक्षीय राज्यकत्र्यांनी त्याविषयी काहीही केलेले नाही, त्यांना मूर्तीचे रक्षण व्हावे, याची कळकळ असू शकेल का ?
हिंदूंनी एकजूट करून त्यांचे सामथ्र्य या धर्मद्रोह्यांना दाखवून हिंदुराष्ट्राची स्थापना करणे, हाच हिंदूंच्या सर्व समस्यांवर एकमेव उपाय आहे. त्यासाठी हिंदूंनो, तुमचा मृतवतपणा टाकून धर्मक्रांती करायला सिद्ध व्हा ! नाहीतर तुमचे अस्तित्व ‘हिंदु’ म्हणून उरणार नाही आणि हिंदु धर्माला काही काळ ग्रहण लागेल.
‘या कार्यासाठी आम्हाला आशीर्वाद द्यावा’, अशी श्री भवानीमातेच्या चरणी प्रार्थना !
- डॉ. जयंत बाळाजी आठवले, संस्थापक, सनातन संस्था. (भाद्रपद शु. ९, कलियुग वर्ष ५११३ (६.९.२०११)
शिवकालीन जमाखर्च प्रत
शिवरायांच्या काळातील हिशेब पत्राची अत्यंत दुर्मिळ असलेली सत्य प्रत मी इथे त्याच्या मराठी अनुवादासकट देत आहे..
ताड़केश्वर मन्दिर उत्तराखंड
मंदिर घने जंगल के बीच घाटी है और चारों तरफ ऊँचे ऊँचे देवदार के पेड़ हैं. कार से उतर कर 500 - 600 मीटर नीचे घाटी में उतरना पड़ता है. उतरने चढ़ने के लिए कंक्रीट का रास्ता और रेलिंग है. यहाँ कैफ़े या ढाबा नहीं है, लाउडस्पीकर नहीं है, साफ़ सफाई है और प्लास्टिक का इस्तेमाल मना है.
मान्यता है की यह सिद्ध पीठ 1500 साल पुरानी है. यहाँ एक आजन्म संत ताड़केश्वर रहा करते थे. एक हाथ में त्रिशूल और दूसरे में डमरू लेकर आस पास के गाँव में जाते थे. कोई गलत काम कर रहा हो या जानवरों को मार रहा हो या पेड़ों को नुकसान पहुंचा रहा हो तो प्रताड़ित करते थे. इस ताड़ना के कारण उनका नाम ताड़केश्वर पड़ गया और मंदिर भी ताड़केश्वर मंदिर कहलाने लगा. प्रस्तुत हैं कुछ फोटो :
![]() |
| प्रवेश द्वार से पैदल यात्रा शुरू |
![]() |
| यात्रीगण |
![]() |
| भक्तों द्वारा बांधी गई लाल चुन्नियाँ |
![]() |
| भक्तों के धागे |
| भक्तों द्वारा दान दी गईं घंटियाँ |
| ऊँचे ऊँचे देवदार के पेड़ों के बीच ताड़केश्वर महादेव मंदिर. नीचे तक धूप मुश्किल ही पहुँचती है और वो भी थोड़ी से देर के लिए |
![]() |
| ताड़केश्वर महादेव मंदिर |
![]() |
| मुख्य मंदिर के पास एक देवी मंदिर भी है |
कण्व ऋषि आश्रम कोटद्वार
यहाँ के मुख्य बस अड्डे से 14 किमी दूर कण्व ऋषि आश्रम है चलिए घूमने चलते हैं. यह आश्रम एक गैर सरकारी संस्था ने बनाया है जिसे जंगल में से 0.364 हेक्टेयर जमीन दी गयी थी. आश्रम मालिनी नदी के बाएँ तट पर घने जंगल के बीच है. बहुत सुंदर हरी भरी जगह है जहाँ कलकल करती मालिनी नदी की आवाज़ सुनाई देती रहती है.
मान्यता है की हस्तिनापुर के राजा दुष्यंत शिकार करते हुए भटक गए और कण्वाश्रम जा पहुंचे. कण्व ऋषि तीर्थ यात्रा पर थे. शकुन्तला ने जिसे ऋषि ने बेटी की तरह पाला था, दुष्यंत की आवभगत की. उनका गन्धर्व विवाह हुआ. दुष्यंत ने वापिस जाते हुए शकुन्तला को अंगूठी पहनाई और कहा की हस्तिनापुर आकर मिले. पर अंगूठी एक दिन नदी में गिर गई और उसे मछली निगल गई. जब शकुन्तला राजा से मिली तो उसने पहचाना ही नहीं. उधर मछली वाले ने अंगूठी बेचने की कोशिश की तो पुलिस ने पकड़ कर राजा के सामने पेश किया. राजा ने अंगूठी देखी तो सब याद आ गया. शकुन्तला की खोज की गई और राजा दुष्यंत ने उसे अपनी रानी बना लिया. बालक भरत पैदा हुआ जो बाद में चक्रवर्ती राजा बना और उसी के नाम पर भारतवर्ष बना.
कालीदास ने इस पर सात अंकों का नाटक लिखा जिसकी वजह से किस्सा और लोकप्रिय हो गया. कालिदास का जन्म कहाँ हुआ था ये तो तय नहीं है पर वे चन्द्रगुप्त द्वितीय के दरबार में रहे अर्थात चौथी शताब्दी के आसपास ही जन्मे थे. पुरातत्व विभाग याने ASI की तरफ से यहाँ कोई बोर्ड या नोटिस नहीं लगा है की कण्व ऋषि, शकुन्तला या भरत का जन्म यहीं हुआ था या वे यहीं रहा करते थे.
बहरहाल सुंदर स्थान है पर कोई पब्लिक टॉयलेट या रेस्टोरेंट की सुविधा नहीं है. सैलानी कम आते हैं. पास में नदी के दूसरी तरफ एक सरकारी और एक प्राइवेट होटल हैं जहां रुका जा सकता है. कुछ फोटो प्रस्तुत हैं:
| घने पहाड़ी जंगल के बीच बना हुआ है कण्व आश्रम. बहुत सुंदर जगह है |
| कण्व आश्रम के बीच बड़ा चबूतरा है जिस पर इन पांच की मूर्तियाँ बनी हुई हैं - कण्व ऋषि, कश्यप ऋषि, राजा दुष्यंत, शकुन्तला और बालक भरत |
![]() |
| कण्व ऋषि. बताया जाता है कि यहाँ ऋषि द्वारा बहुत बड़ा गुरुकुल चलाया जाता था |
![]() |
| कश्यप ऋषि भी यहाँ गुरुकुल में शिक्षा देते थे |
![]() |
| राजा दुष्यंत और रानी शकुन्तला |
![]() |
| बालक भरत शेर के दांत गिनते हुए |
![]() |
| मालिनी नदी पर बना पुल |
| नोटिस बोर्ड |
| रामानंद जी पिछले पच्चीस सालों से यहीं आश्रम में रहते हैं और ऋषि - मुनियों, दुष्यन्त - शकुंतला के बारे में काफी जानकारी देते हैं |
शुक्रताल
- जो मनुष्य सर्वथा मृत्यु के निकट हैं उसे क्या करना चाहिए ?
- मनुष्य मात्र को क्या करना चाहिये, किसका श्रवण, किसका जप, किसका स्मरण तथा किसका भजन करे व किसका त्याग करे जिससे मोक्ष की प्राप्ति हो?
उत्तर में ऋषि शुकदेव ने सात दिनों तक श्रीमद् भागवत पुराण सुनाकर राजा के प्रश्नों का उत्तर दिया और काल से भयमुक्त कर दिया. ऋषि ने कहा:
- हे राजन,
- मनुष्य सर्वथा निडर होकर वैराग्य रुपी शस्त्र से शरीर, स्त्री, पुत्र, धन के मोह को काट फेंके,
- धैर्य के साथ निर्जन और पवित्र स्थान पर बैठ ॐ का जाप करे,
- प्राणायाम से मन वश में करे,
- बुद्धि द्वारा विषयों को दूर करे और
- कर्म कल्याणकारी रूप में लगाए.
राजा परीक्षित ने नियमों का पालन करते हुए तप किया और मोक्ष को प्राप्त हुए.
शुकदेव मंदिर परिसर का विशालकाय बरगद भी उसी समय का माना जाता है.
शुक्रताल में श्रीमद्भागवत पुराण पर आधारित भागवत कथाएँ विभिन्न भाषाओं में पूरे साल ही चलती रहती हैं.
| मूर्तिकार केशवराम द्वारा निर्मित मूर्ति की उंचाई चरणों से मुकुट तक 42 फीट 3 इंच है. इसे बनाने में एक वर्ष लगा. प्राण-प्रतिष्ठा समारोह 6 अप्रैल 1989 को संपन्न हुआ |
| प्राचीन वट-वृक्ष पूरे शुकदेव मंदिर परिसर पर छाया हुआ है |
| बरगद की ठंडी छाँव में दोपहर |
| साधू संतों का डेरा |
| शिव मन्दिर |
| हिंदी के अलावा कई भाषाओं में भागवत प्रवचन चलते रहते हैं |
| बाज़ार का एक दृश्य |
| नगर का एक दृश्य |
| शांत बहती गंगा |
![]() |
| दिल्ली से मेरठ बाइपास और मुज़फ्फरनगर बाईपास होते हुए शुक्रताल लगभग 125 किमी की दूरी पर है |
भारत में ममी
![]() |
| हिमाचल के ग्यु गाँव में मिली ममी |
![]() |
| संत ज़ेवियर की ममी का बॉक्स |
![]() |
| मिश्र में प्राप्त एक सुरक्षित ममी |
गोवा का बैसिलिका ऑफ़ बोम जीसस चर्च
|
![]() |
गोवा का बैसिलिका ऑफ़ बोम जीसस चर्च
|
![]() |
![]() |
![]() |
![]() |
| गोवा का बैसिलिका ऑफ़ बोम जीसस चर्च |
























































































































_(37428423256).jpg)










































































































































































.jpg)






.jpg)
No comments:
Post a Comment