Wednesday, July 30, 2025

आदिम महाराष्ट्र

ऐतिहासिक ‘महाराष्ट्र’

 March 31, 2019 

१ मे ,१९६० रोजी भाषेच्या आधारावर स्वतंत्र महाराष्ट्र राज्याची निर्मिती झाली. त्यासाठी झालेला लढा आपल्याला माहित आहेच. परंतु महाराष्ट्र राज्याचा इतिहास किती मागे जातो,याचा विचार करायचा म्हटले तर सर्वसाधारणपणे आपल्या समोर शिवाजी महाराज, पेशवे हे सगळं डोळ्यासमोर उभे राहाते. त्या आधी इथे होऊन गेलेल्या साम्राज्यांची तितकीशी ओळख नसते. तेच मांडण्याचा हा एक प्रयत्न…
‘महाराष्ट्र’ या नावाने प्रसिद्ध असलेले आपले राज्य खूप प्राचीन काळापासून या नावाने ओळखले जाते. अर्थात त्यावेळी त्याचा भौगोलिक विस्तार किती होता याविषयी विविध मते आहेत. प्राचीन काळात रट्ठ नावाची एक जमात येथे राहत होती. त्यांच्या पराक्रमामुळे ते ‘महारट्ठ’ (महान रट्ठ) म्हणून ओळखले जाऊ लागले. पुढे या शब्दाचा अपभ्रंश होत होत ‘महाराष्ट्र’ नाव झाले असावे अशी एक समजुत आहे. तसेच ‘महाराष्ट्र’ हा उल्लेख इतिहासात इसवी सन दुसऱ्या शतकापासून मिळाला आहे,असेही मानण्यात येते. इसवी सन सातव्या शतकात भारतभेटीवर आलेल्या ह्युआन श्र्वांग या चिनी मुसाफिराच्या पुस्तकात महाराष्ट्राचा संदर्भ आला आहे.हे झाले ‘महाराष्ट्र’ या नावाबद्दल.पण अश्म युग,ताम्रपाषाण युग इतक्या प्रागैतिहासिक काळात महाराष्ट्राचे अस्तित्व असल्याचे पुरातन संशोधनातून समोर आले आहे. संशोधकांना महाराष्ट्रात अनेक पुरातन जागा मिळाल्या आहेत.
महाराष्ट्र हा ‘कणखर देशा, दगडांच्या देशा’ असाच ओळखला जातो. महाराष्ट्राच्या भूतकाळातील पहिले पान म्हणजे अश्मयुग (पाषाणयुग).अश्मयुग या नावातच त्याचा अर्थ दडलेला आहे. अश्मयुग (stone age) म्हणजेच मानवाच्याविकासाचा प्रथमाध्याय होय ! या काळातील माणूस भटक्या अवस्थेत होता. नदी हीच त्याची जीवनदायिनी. नदीकाठी वास्तव्य करुन आपल्या आजुबाजुला उपलब्ध असलेल्या दगडांपासून तो हत्यारे तयार करीत असे. महाराष्ट्रातील बोरी येथे काही अश्मयुगीन हत्यारे टेफ्रा (ज्वालामुखीची राख) वर मिळाली होती. वैज्ञानिक तपासानुसार ही राख १.४ दशलक्ष वर्षांपूर्वीची असल्याने तिथे सापडलेल्या या वस्तू अश्मयुगीन काळातील असल्याचे सिद्ध झाले. त्यानंतर तांबे या धातुचा शोध लागला. या कालावधीला पुरातत्त्व शास्त्रज्ञ ताम्रपाषाणयुग असे संबोधतात. महाराष्ट्रातील दायमाबाद, सावळदा, इनामगाव व अश्या अनेक ठिकाणी उत्खननात तांबे व त्याबरोबरच त्या काळात वापरली जाणारी मातीची खापरे आणि इतर काही वस्तू व वास्तु संशोधकांना मिळाल्या. याचबरोबरीने शेतीसंस्कृतीचा उदय ही महाराष्ट्रात झाला होता. मुळातच अनेक नद्यांमुळे ही भूमी सुपीक आहे. त्यामुळे इथल्या नद्यांच्या प्रदेशात हा माणूस शेतीसाठी स्थिरावला.पुढे ‘लोखंड’ या धातूशी मानवाची ओळख झाली. साधारणतः हा काळ इ.स. पूर्व १२०० पासून सुरु झाला असं म्हणतात. ‘लोह’ हा माणसाच्या आयुष्यातला एक अतिशय महत्त्वाचा असा शोध ठरला. महाराष्ट्रातील विदर्भ भागात जमीनी खाली लोखंडाची काही हत्यारे, व इतर वस्तू संशोधकांना सापडल्या. त्याच बरोबर नायकुंड ह्या नागपुर जवळ असलेल्या गावात लोखंडाची काही हत्यारे व चिकणमातीपासून बनवलेली लोह भट्टी मिळाली.त्याचबरोबर संशोधकांना ‘megalithic burial ‘ (प्राचीन काळी काही जमातींमध्ये माणूस मृत्यू पावल्यावर त्याला ज्या जागी पुरले जायचे तेथे मोठे मोठेदगड रचून ठेवले जायचे) चे काही अवशेष ही मिळाले. त्याच प्रमाणे माहुर्झरी, जूनापाणी,इत्यादी ठिकाणी बरेच महत्त्वाचे शोध लागले.

हिरापूर येथील Megalithic Burial

यानंतर उदयास आला तो ऐतिहासिक काळ. या काळात लिखाण अस्तित्त्वात आले. विविध साहित्य लिहिले गेले.त्यामुळे या काळाला पुरातत्त्व संशोधनात वेगळे महत्त्व आहे. हा काळ म्हणजेच बुद्ध आणि महावीर यांचा काळ. इसवी सन पूर्व ६०० पासून या काळाची सुरुवात झाली असावी असे मानण्यात येते. याच काळात विविध साम्राज्य अस्तित्वात आली.ज्यावेळी भारतभर विविध प्रदेशात अनेक राजे राज्य करत होते त्यावेळी महाराष्ट्रात सुद्धा शक्तिशाली साम्राज्ये निर्माण झाली. व्यापारी केंद्राचे मुख्य ठिकाण ‘शुर्पारक’ (आताचे नालासोपारा), येथे इ. स. पुर्व ३ ऱ्या शतकात सम्राट अशोकाने धर्मप्रचारासाठी मौर्य ब्राम्ही लिपीत लिहिलेला शिलालेख प्रसिद्ध आहे. या ऐतिहासिक काळात अनेक राजवटींनी या प्रदेशावर आपली सत्ता गाजवली. इसवी सन पूर्व दुसरे शतक ते इसवी सन पहिले यामध्ये सातवाहन साम्राज्य महाराष्ट्रात प्रबळ होते. प्रतिष्ठान (आताचे पैठण) हे त्यांचे राजधानीचे ठिकाण होते. या कालखंडात कार्ले, भाजे, कान्हेरी, बेडसे या सगळ्यात प्राचीन समजल्या जाणाऱ्या बौद्ध गुंफा कोरल्या गेल्या.याच साम्राज्यातील राजा श्री सातकर्णी ह्याची राणी नागणिका हिने अखंड भींतीवर कोरलेला शिलालेख हा एक महत्वाचा ऐतिहासिक दुवा संशोधकांना नाणेघाट येथे सापडला आहे. त्यावरून त्या काळातील सातवाहन राजे, देव ,व्रते ,दानधर्म आणि समाजातील धार्मिक बाबींचा उलगडा झाला. याच लेणीत एक प्रतिमागृह असल्याचे ही कळते व त्या भग्न प्रतिमांखाली राजांची नावे देखील कोरलेली आहेत. गौतमीपुत्र सातकर्णी हा या घराण्यातील महान राजा होऊन गेला. एका शिलालेखात ‘त्रि समुद्र तोय पित वाहना’ ( ज्याचा घोडा तीन समुद्राचे पाणी प्यायला आहे ) असा उल्लेख या राजाबद्दल केला आहे.या वरूनच सातवाहनांचा प्रभाव दिसून येतो.

नागाणिका राणीचा भिंतीवरील शिलालेख
बेडसे चैत्यगृह

इसवी सन २५० – ५०५ दरम्यान वाकाटक राजवटीने राज्य केले. विदर्भातील नगरधन ( पूर्वीचे नंदीवर्धन) ही यांची राजधानी असल्याचे पुरावे सांगतात आणि येथे मोठ्या प्रमाणात उत्खनन ही झाले. मन्सर, रामटेक, वाशीम, पौनार, मांढळ, कौदिन्यपूर ही या राजवटीची काही महत्वाची स्थाने होती.त्याचवेळी उत्तरेस गुप्त घराणे हे सुद्धा प्रभावशाली होते.राजा चंद्रगुप्त दुसरा, याची कन्या प्रभावतीगुप्त ही वाकाटक घराण्याची सून झाली आणि ह्या दोन राजवटींचे एकमेकांशी संबंध जोडले गेले. या संबंधातून गुप्त घराण्याच्या धार्मिक विचारांचा वाकाटकांवर पगडा दिसून आला. राणी प्रभावती हिच्या शिलालेखांतून हे दिसून येते. शिवभक्त असणाऱ्या वाकाटकांनी पुढील काळात नरसिंह,वराह यांची मंदिरे बांधली.
स्थापत्यकलेच्या जडणघडणीत हा एक महत्वाचा काळ मानण्यात येतो. वाकाटक घराण्यातील हरिशेन राजा याच्या काळात अजिंठा लेणीचे काम जोमाने सुरु झाले.अनेक प्राचीन हिंदू मंदिराचे बांधकाम या काळातील असल्याचे दिसून येते.

याशिवाय अनेक महत्वाच्या राजघराण्यांचा महाराष्ट्राच्या जडणघडणीत वाटा होता. चालुक्य, राष्ट्रकूट,कलचुरी,शिलाहार, यादव यांचा समृद्ध काळ महाराष्ट्राने अनुभवला. घारापुरी (एलिफंटा)लेणी, अंबरनाथ शिवालय, कोपेश्वर, देवगिरी अशी अनेक स्थाने या समृद्धीची प्रतीके म्हणून ओळखली जातात.याशिवाय महाराष्ट्र प्रदेशाबाहेरील मौर्य ,गुप्त, मुघल राजवटीसारख्या अनेक राजवटींचा प्रभावही इथे दिसून आला.त्यानंतर मग आपल्या सर्वांच्या परिचयाचा असा मराठे आणि पेशवे यांचा काळ सुरु झाला.
एकूणच महाराष्ट्राचा ऐतिहासिक कालखंड विविधप्रकारे भारत आणि जगाच्या इतिहासाचा अभ्यास करताना मोलाची भूमिका बजावतो.

वेरुळ येथील कैलाश मंदिराचे शिखर

माहिती संकलन आणि सर्व छायाचित्रे : ऐश्वर्या देवस्थळी
शब्दांकन : स्वाती भट

 

भारतातील पुरातत्त्व संशोधनाचा प्रवास..


Skip to content

पुरातत्त्व म्हणजे नक्की काय व त्याचा अभ्यास कसा असतो हे आपण गेल्या भागात वाचले. पण हे पुरातत्त्व संशोधन सुरू कधी झाले? विशेषतः भारतात त्याचा उगम कसा झाला हे वाचूया या भागात.

पुरातत्त्व संशोधन भारतात कधीपासून सुरू झाले याचा विचार करत असताना आपल्याला मुख्यतः तीन कालखंड लक्षात घ्यावे लागतात.एक ब्रिटिश भारतात येण्यापूर्वी,दुसरा ब्रिटीश साम्राज्य असताना आणि तिसरा स्वातंत्र्यानंतरच्या कालावधीत. ज्या मुलखावर राज्य करायचे त्याची संपन्न संस्कृती आणि इतिहास माहित असेल तर कारभार करणे सोप्पे होईल हा उद्देश पहिल्या दोन्ही कालखंडात होता.
भारतात ब्रिटिश राजवट सुरू होण्याआधी जे राजे होऊन गेले त्यांनी ऐतिहासिक साहित्य, दस्तऐवज, वास्तू यामध्ये रस दाखवला होता. अकबर आणि समकालीन राजांनी रामायण, महाभारत अशा प्राचीन ग्रंथाचा अभ्यास केला होता आणि तसेच या ग्रंथांची विविध भाषांतरे करून वेगवेगळ्या देशांत प्रसिध्द केली.
या कालखंडात त्याला संशोधनाचे स्वरूप आले नव्हते. तर ते केवळ आवड व उत्सुकता म्हणून केले जात होते. परंतु एक संशोधनाची शाखा म्हणून ‘पुरातत्त्व’ अभ्यास ब्रिटिशांनी भारतात आणला. सुरुवातीला लागलेले काही शोध हे अचानकपणे लागलेले होते. त्यामध्ये ठराविक उद्दिष्ट ठेउन शोध सुरू केला नव्हता. बांधकामे सुरू असताना, रस्ते खणताना काही नाणी, प्राचीन वस्तू सापडल्या. त्यानंतर प्राचीन साहित्यावर अभ्यास सुरू झाला. पौराणिक कथा आणि त्यात असलेले संदर्भ यावर संशोधन सुरू झाले.हस्तिनापूर, अवंती, कोसंबी,पाटलीपुत्र वगैरे शहरांचा कथांमधील उल्लेख आल्याने ही शहरे शोधण्याच्या उद्देशाने पुढे अभ्यास सुरू होता. त्या दरम्यान कलकत्ता येथे १७८४ साली ‘रॉयल एशियाटिक सोसायटी’ची स्थापना झाली. ब्रिटिश ज्युरी आणि संस्कृत पंडित विल्यम जॉन्स यांनी या संस्थेची स्थापना केली.ही संस्था भारतीय संस्कृती आणि इतिहास यांच्या अभ्यासाचे केंद्र बनले. तिथूनच पुढे पुरातन संशोधनाला खऱ्या अर्थाने चालना मिळाली.अलेक्झांडर कन्निंग्हम यासारखे ब्रिटिश आर्किओलॉजिस्ट आणि त्याचबरोबर काही भारतीय अभ्यासक यांचा या संशोधनात महत्वाचा वाटा होता.हसमुख धीरजलाल सांकलिया हे संस्कृत विद्वान आणि आर्किओलॉजिस्ट यांचे भारतातील पुरातत्त्व संशोधन कार्यात महत्वाचे मोलाचे योगदान होते.त्यांनी प्रोटो आणि प्राचीन भारतातील कालखंडाबाबत संशोधन केले होते.तसेच पुढील काळात पुण्यातील डेक्कन कॉलेजमध्ये आर्किओलॉजीचे रीतसर अभ्यासक्रम सुरु करण्यात अग्रेसर होते.
१८६१ साली ‘आर्किऑलॉजिकल सर्व्हे ऑफ इंडिया’ या सरकारी संस्थेची स्थापना करण्यात आली. तेव्हापासून पुरातत्त्व संशोधन आणि अभ्यास यावर ही संस्था आजतागायत काम करत आहे.
विविध ठिकाणी सुरू असलेल्या अभ्यासामध्ये भारताचा इतिहास अश्मयुगीन काळापर्यंत मागे जातो याचा शोध लागला. त्या काळात वापरात असलेली दगडांची हत्यारे अशाच एका उत्खननात ब्रिटिश आर्किओलॉजिस्ट रॉबर्ट ब्रूस फूट यांना मद्रास जवळ पल्लवरम येथे १८६३ साली सापडली. त्यामुळे त्यांना “फादर ऑफ इंडियन प्री-हिस्टरी” या विशेषणाने ओळखले जाते.
भारतीय इतिहास हा साधारण १.४ दशलक्ष वर्षे किंवा त्यापेक्षाही जुना आहे याचे पुरावे एका संशोधनातून समोर आले. महाराष्ट्रातील बोरी येथे काही अश्मयुगीन हत्यारे ज्वालामुखीच्या राखेच्या थरावर मिळाली होती. वैज्ञानिक संशोधनातून या टेफ्राचा काळ शोधण्यात आला. तो काळ १.४ दशलक्ष वर्षांपूर्वीचा असल्याने त्यात सापडलेल्या वस्तू अश्मयुगीन काळातील असल्याचे सिद्ध झाले. अनेक ठिकाणी उत्खनन चालू होतेच. तसेच पहिली नागरी संस्कृती म्हणून ओळखल्या जात असलेल्या सिंधू संस्कृतीवर शोध स्वातंत्र्य पूर्व काळापासून शोध चालु होताच. स्वातंत्र्य मिळाल्यावर फाळणी नंतर सगळ्या साइट्स सध्याच्या पाकिस्तानात गेल्या.त्यामुळे भारताने नव्याने सिंधू संस्कृती शोध मोहिम सुरु केली आणि स्वतंत्र भारतातील सिंधू संस्कृतीवर प्रकाश पडला.
कोणत्याही संस्कृतीबाबत जाणून घ्यायचे असेल तर तेथील प्रचलित भाषा व लिखित माहिती समजुन घेणे सगळयात महत्वाचे ठरते. प्राचीन भारतात ब्राह्मी, खारोश्ती ह्या लिपी कारभारासाठी वापरल्या जात होत्या. अशाच संशोधनात अनेक शिलालेख मिळाले. तेव्हा ही लीपी सोडवण्याचे प्रयत्न सुरु झाले. ब्रिटिश आर्किओलॉजिस्ट जेम्स प्रिन्सेप यांनी १८३७ साली पहिल्यांदा ही लीपी सोडवली होतीच. त्यामुळे पुढील संशोधनास नवीन दिशा मिळाली आणि अनेक विद्वान लोकांनी त्यांचे शोध पुढे आणून प्राच्य ज्ञानात महत्त्वपूर्ण योगदान दिले. स्वातंत्र्यपूर्व काळात आणि स्वातंत्र्योत्तर काळात पुरातत्त्व संशोधनासाठी ही महत्वाची कामगिरी बजावत आहे. आजपर्यत सिंधू संस्कृतीच्या अनेक साइट्स सध्याच्या भारतात राजस्थान ,गुजरात,पंजाब,हरियाणा इत्यादी ठिकाणी मिळाल्या आहेत.प्राचीन भारताविषयी अजूनही खूप संशोधन या संस्थेमार्फत वेगवेगळ्या ठिकाणी सुरु आहे.आतापर्यंत झालेल्या अशाच संशोधनांविषयी आपण पुढील काही भागात अधिक जाणून घेऊया.

संकलन -ऐश्वर्या देवस्थळी
शब्दांकन- स्वाती भट

पुरातत्त्व म्हणजे काय??


Skip to content

आठवणींमध्ये रमायला कोणाला आवडत नाही ? किंवा आपल्या आधी घडलेल्या घटना ऐकताना आपण रमतोच! थोडक्यात काय तर आपल्या पूर्वीचा इतिहास हा नेहमीच माणसाच्या कुतूहलाचा भाग राहिला आहे.नदीचे मूळ आणि ऋषींचे कूळ शोधू नये असे म्हंटले जाते.परंतु हे शोधायचा प्रयत्नच नाही केला तर माणसाला सिंधू नदीच्या काठी वसलेल्या संस्कृतीचा शोध कसा लागला असता? सिंधू संस्कृतीतल्या माणसांविषयी कसे कळले असते? अगदी पृथ्वीचा उगम कसा झाला, इथपासून ते आता काही शतकांपूर्वी भारतात अस्तित्वात असलेल्या साम्राज्यांविषयी अनेक गोष्टींचा उलगडा होण्यामागे मूळ कारण होते ते माणसाचे कुतूहल. ह्या कुतूहलातूनच संशोधन सुरू झाले आणि पुरातत्व या शाखेचा उदय झाला. पुरातत्त्वाचा अर्थच पुरातन तत्त्व. अर्थात प्राचीन तत्त्व. मग हे तत्त्व काही केवळ मानवी प्रजातीचंच असेल असे नाही तर अगदी प्राणी, वनस्पती अशा सजीव घटकांपासून ते पूर्वीच्या काळी वापरली जाणारी भांडी ,नाणी,अशा अनेक निर्जीव गोष्टींचा यात समावेश होतो. राजे -राजवाडे, कला ,संस्कृती, साहित्य यांनी आपला पूर्वकाल समृद्ध आहे. या सगळ्यांचे संशोधन म्हणजे पुरातत्त्व संशोधन म्हणता येईल.

लिखित इतिहास आणि पुरातत्त्व संशोधन यामध्ये नक्की काय फरक याविषयी एक संभ्रम सर्वसामान्य जनांच्या मनात कायम असतो. आपण शाळेत किंवा अन्य पुस्तकात वाचतो तो इतिहास अशी आपली समजूत असते.परंतु खरं म्हणजे लिखित आणि पुरातत्व संशोधन हे दोन्ही एकमेकांना पूरक ठरतात.

काही बखरी,दस्तावेज,शिलालेख यांच्या संदर्भावरून पुरातत्व संशोधक अभ्यास करत असतात त्याचवेळी त्यांनी केलेले संशोधन लिखित स्वरूपात आपल्याला पुस्तकांनातुन वाचायला मिळते. तेच आपण इतिहास म्हणून वाचत असतो. पुरातत्त्व संशोधनात मानवी इतिहासापासून ते भाषा, संस्कृती, साहित्य, कला, विज्ञान, समाजशासत्र अशा अनेेक विषयांचा अभ्यास सामावलेला असताे. असे संशोधन करताना फार वेगवेगळे अनुभव येत असतात. एक अभ्यासक म्हणून या प्राचीन तत्त्वाचा अभ्यास करताना या वास्तूंविषयी,वस्तूंविषयी एक आगळा दृष्टिकोनच सापडतो.तोच मांडण्याचा प्रयत्न पुढच्या लेखमालेत असेल…क्रमशः

लेणी:महत्वाची ऐतिहासिक वास्तू


Skip to content

ऐतिहासिक वास्तू या पुरातत्त्व संशोधनात महत्त्वाची भूमिका बजावत असतात. त्या काळाच्या साक्षीदार असलेल्या या वास्तू आपल्यासमोर तो ऐतिहासिक काळ उलगडून दाखवतात. महाराष्ट्राला गड-किल्ल्यांची अनमोल ठेवा आहे. एखाद्या गडावर गेल्यावर आजही मराठी मावळ्यांचा पराक्रम आठवून ऊर अभिमानाने भरून येतो. किल्ल्यांप्रमाणेच अजून एक महत्वाची वास्तू म्हणजे लेण्या.लेण्या त्या त्या काळातील सामाजिक,आर्थिक,राजकीय ,सांस्कृतिक स्थितीचे संदर्भ आपल्यापर्यत पोहचवतात. ‘लेणी’  म्हणजे डोंगर, टेकडी पर्वत, खडक कोरून तयार केलेली गुहा. संपूर्ण भारतात मिळून एकूण १२०० च्या आसपास लेण्या आहेत. त्यापैकी जवळपास ८०० लेण्या या फक्त महाराष्ट्रात आढळतात. याचे प्रमुख कारण म्हणजे महाराष्ट्रातील अग्निजन्य खहक हा अशा प्रकारच्या कोरीव कामासाठी अनुकूल होता. हा खडक मध्यम कठोर असून  यावर कोरीव काम करणे सहज शक्य होते. घारापुरी, कान्हेरी, महाकाली अशा अनेक लेण्या महाराष्ट्रात आहेत. अजिंठा-वेरूळ लेणी बघण्यासाठी तर परदेशी पर्यटकसुद्धा गर्दी करतात.

या लेण्यांचे  एक महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे या धार्मिक वास्तू आहेत. सर्वात जास्त गुहा बौद्ध धर्मियांसाठी केलेल्या आहेत. विविध धर्मांच्या आश्रयदात्यांनी त्या कोरण्यासाठी सढळ हातांनी दानधर्म केला.  या लेण्या घडवण्यासाठी  बौद्ध धर्माचे अनुयायी असलेल्या राजांकडून ही भरघोस मदत घेतली जायची. आतापर्यंतच्या संशोधनानुसार महाराष्ट्रात लेण्यांचा काळ इसवी सन पूर्व पहिले -दुसरे शतका पर्यंत मागे नक्कीच  खेचता येईल. भाजे, कार्ले, बेडसे या लेण्या या अगदी सुरवातीच्या काळात कोरण्यातआल्या असे संशोधकांचे मत आहे. सम्राट अशोकाने अंदाजे तिसऱ्या शतकात बिहार येथे बांधलेल्या लोमसऋषि लेणीचा महाराष्ट्रातील लेण्यांच्या घडणीत प्रभाव दिसून येतो.

हिनायन आणि महायन अशा दोन कालखंडात या लेण्यांचे प्रकार प्रामुख्याने विभागले जातात. बौद्ध धर्माच्या सुरुवातीच्या काळातील हीनयान पंथामध्ये बुद्धाचे मानवी रूप गृहित धरले होते. त्यामुळे त्यांना मूर्तिपूजा अमान्य होती. त्यांच्या कलाविष्कारामध्ये बुद्धाच्या प्रतीकांना  महत्त्व होते. बुद्धाच्या जीवनातील चार प्रमुख घटना चार प्रतीकांच्या द्वारे दर्शविल्या जात. जन्माचे प्रतीक हत्ती (श्वेत गज), ज्ञानाचे प्रतीक पिंपळवृक्ष (बोधिवृक्ष), उपदेशाचे प्रतीक चक्र(धर्मचक्र), तर बुद्धाच्या निर्वाणाचे प्रतीक स्तूप, अशा रीतीने हीनयान पंथाची कला दिसून येते.  हिनायन पंथ बुद्धांच्या मूळ शिकवणीचे पालन करतो.  आत्म-शिस्त व ध्यान यांच्याद्वारे हे मोक्ष मिळवणे यावर भर देतात. महायान पंथाच्या उदयाबरोबर बौद्ध धर्मात मूर्तिपूजेला प्रारंभ झाला. त्यात बुद्धाला लोकोत्तर दैवी अंश मानून त्याच्या भक्तीला प्राधान्य देण्यात आले. त्यातून बुद्धाच्या विविध प्रतिमांची  निर्मिती  झाली. बुद्धाच्या मूर्ती निरनिराळ्या मुद्रा-प्रकारांत दिसून येतात. ध्यानस्थ मुद्रा,  भूमीस्पर्श मुद्रा, अभय मुद्रा, वितर्क मुद्रा हे त्याचे काही प्रकार.

पूर्वीच्या काळी पावसाळ्यात आश्रय घेण्यासाठी बौद्ध भिक्खू तसेच व्यापारी वर्ग लेण्यांचा उपयोग करत असत. ‘वर्षावास’ म्हणून  सुद्धा या लेण्या वापरल्या जात होत्या. या लेण्यांंमध्ये त्या काळात प्रचलित असलेल्या  ब्राह्मी लिपीमध्ये, व प्राकृत आणि संस्कृत भाषांमध्ये शिलालेख आढळून येतात. ते मुख्यत: दानलेख या स्वरूपाचे आहेत.

जेवणासाठी/शिक्षणासाठी सभागृह

या लेण्यांमध्ये विहार आणि चैत्यगृह हे दोन मुख्य प्रकार असतात. तसेच पाणपोई, मंडप या सारख्या सोयी असतात. विहार म्हणजेच जिथे राहण्याची व्यवस्था असते अशी जागा. हीनयान पंथाच्या उपासकांनी इसवी सन दुसऱ्या शतकात डोंगर खोदून विहार आणि चैत्य निर्माण करण्यास सुरुवात केली. या काळानंतरच भारतात पुण्याजवळ भाजे, कोंडाणे, कार्ले तसेच जुन्नर, बेडसे, अजिंठा, नाशिक अशा ठिकाणी चैत्यगृहे व विहारांची निर्मिती झाली.

भाजे चैत्यगृह

विहार बांधताना त्यामध्ये मोठा दिवाणखाना, काही ठिकाणी शयनगृह तसेच आश्रितांसाठी निवासव्यवस्था या सुविधा असायच्या. चैत्यगृह हे सर्वांसाठी प्रार्थनागृह म्हणून बांधलेले असे.चैत्यगृहामध्ये स्तूप असतो. स्तूप म्हणजेच, महान व्यक्तींच्या निधनानंतर त्यांच्या अस्थी, जमिनीत पुरून त्यावर दगड व मातीचा ढिगारा रचला जायचा. मृताचे स्मारक म्हणून  घुमटाच्या आकारचे शिल्प तयार केले जायचे. वेदिका, अंड, हर्मिका आणि छत्रावली अशा रचनेमध्ये हे स्तूप शक्यतो बांधले जात. काही ठिकाणी निर्वाणवीथी ( स्मशानगुफा सुद्धा) पहायला मिळतात. भाजे, कान्हेरी या काही नमूद करण्यासारख्या  जागा. वेरुळ ( गुफा क्र.05) व कान्हेरी ( क्र. ११)  या लेण्या शैक्षणिक केंद्र असल्याचे ही समजले जाते.

निर्वाणवीथी

कालौघात या लेण्यांच्या रचनेत अनेक बदल झाले; या मधूनच मंदिरे यासंकल्पनेचा उदय झाला व मंदिरे अस्तित्वात आली.बुद्ध धर्माचा प्रभावअसलेल्या ‘ब्राह्मणीकल लेण्या’ ही बांधल्या गेल्या.त्याची सुरुवात साधारणइसवी सन पाचव्या शतकापासून झाली असावी असे संशोधन सांगते.त्याविषयी वाचूया पुढच्या भागात…

माहिती संकलन व सर्व छायाचित्रे: ऐश्वर्या देवस्थळी

शब्दांकन : स्वाती भट

जुन्नर येथील शिलालेख
 

सिंधुदुर्गात आढळली हजारो वर्षांपूर्वीच्या गूढ संस्कृतीतील मृतांची स्मारकं

घुमडे गावात आढळलेले माहापाषाणीय संस्कृतीतले शिळावर्तुळ

फोटो स्रोत, Amit Samant

फोटो कॅप्शन, घुमडे गावात आढळलेले माहापाषाणीय संस्कृतीतले शिळावर्तुळ
    • Author, संकेत सबनीस
    • Role, बीबीसी मराठी प्रतिनिधी

कोकणवासियांनो आणि पर्यटकांनो, सिंधुदुर्गात मालवणला जाताना, घुमडे या गावाजवळ माळरानावर गोल आकारात रचलेले काही मोठ्या आकारातील दगड पाहिले आहेत का? जर पाहिले असतील, तर लक्षात घ्या ते साधेसुधे दगड नाहीत.

ती गोलाकार मांडलेली 'शिळावर्तुळं' आहेत. ही आहेत उत्तर अश्मयुगातील किंवा महापाषाणीय संस्कृतीतील नागरिकांनी मृत आप्तस्वकीयांच्या स्मरणार्थ उभारलेली स्मारकं.

अशा स्वरुपाची स्मारकं महाराष्ट्रात अडीच हजार वर्षांपूर्वी निर्माण झाली होती. यामुळे कोकणात अश्मयुगाच्या अखेरीस नेमकी कोणती संस्कृती नांदत होती? हा नवा प्रश्न पुरातत्वज्ञांसमोर उभा राहिला आहे.

महाराष्ट्रातल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यांत शिळावर्तुळं आढळली आहेत. या वर्तुळांचं आणि स्मृतीस्मारकांच्या नेमका काळ ठरवण्याचं (डेटींग) काम सध्या सुरू आहे. आतापर्यंत केवळ पुणे, विदर्भ, कर्नाटक इथेच ही स्मारकं आढळली होती.

पुरातत्वज्ञांच्यामते अश्मयुगात अशा प्रकारची शिळास्मारकं उभारण्याची पद्धत रूढ होती. परंतु कोकणात अशी शिळावर्तुळं कधीच आढळली नव्हती.

याही पूर्वी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पेंडूर येथे पुरातत्वअभ्यासक व पत्रकार विनायक परब यांना सापडलेल्या दोन महापाषाण युगीन शिळास्मारकाच्या निमित्ताने कोकणाचा इतिहास अश्मयुगीन कालखंडापर्यंत मागे गेला होता, त्यात आता घुमडे गावाच्या शिळावर्तुळांची भर पडली आहे.

सिंधुदुर्ग किल्ला आणि तारकर्ली बीच यांच्यामुळे प्रसिध्द असलेल्या मालवण शहरापासून 6 किलोमीटरवर घुमडे हे गाव आहे. गावातल्या निसर्गरम्य पठारावर 7 शिळावर्तुळं (Megalithic Circles) शोधून काढण्यात हौशी पुरातत्वअभ्यासक अमित सामंत आणि पुरातत्व अभ्यासक विनायक परब यांना यश आले आहे.

यापूर्वी महाराष्ट्रात विदर्भात अशा प्रकारची शिळावर्तुळं सापडलेली आहेत. पण, दक्षिण कोकणात प्रथमच अशा प्रकारची महापाषाणीय शिळावर्तुळं सापडली आहेत.

घुमडे गावात आढळलेले माहापाषाणीय संस्कृतीतले शिळावर्तुळ

फोटो स्रोत, Amit Samant

फोटो कॅप्शन, दक्षिण कोकणात प्रथमच अशा प्रकारची महापाषाणीय शिळावर्तुळं सापडली आहेत.

शिळावर्तुळं म्हणजेच विशिष्ट आकाराचे दगड ठराविक अंतरात गोलाकार रचण्यात आलेले असतात. ही एकप्रकारची स्मृतिस्मारकं असतात. आपल्या नातेवाईकांच्या स्मरणार्थ अशी स्मारकं रचण्याची परंपरा महापाषाणीय मानवी संस्कृती असल्याचं पुरातत्वज्ञांचं मत आहे.

मुंबई विद्यापीठाच्या 'सेंटर फॉर एक्स्ट्रा म्युरल स्टडीज' आणि 'इन्स्ट्युसेन' (INSTUCEN) यांच्यावतीने विद्यापीठातील मराठी भाषा भवन इथे 'एक्सप्लोरेशन इन महाराष्ट्र - 5' ही कार्यशाळा पार पडली. या कार्यशाळेत महाराष्ट्रातील 23 व्यावसायिक आणि अव्यावसायिक पुरातत्ववेत्यांनी विविध विषयांवर आपले शोधनिबंध सादर केले.

जून महिन्याच्या अखेरीस पार पडलेल्या या कार्यक्रमाला राज्याच्या पुरातत्व विभाग आणि संग्रहालयाचे संचालक डॉ. तेजस गर्गे हे उपस्थित होते. याच कार्यशाळेत घुमडे गावात आढळलेल्या महापाषाणीय शिलावर्तुळांविषयी शोधनिबंध सादर करण्यात आला.

शिळावर्तुळं म्हणजे काय?

सिंधुदुर्गातील घुमडे इथल्या शिळावर्तुळंचा शोध घेणारे विनायक परब यांच्याशी बीबीसी मराठीनं बातचीत केली.

शिळावर्तुळं म्हणजे नेमकं काय? या प्रश्नाचं उत्तर देताना परब सांगतात, "अश्मयुगीन काळात माणसांच्या मृत्यूनंतर त्यास दफन केलेल्या ठिकाणी त्यांच्या स्मृती जपण्यासाठी शिळास्मारकं उभारली जात असतं किंवा शिळावर्तुळं रचली जात असत. सिंधुदुर्गातील घुमडे गावात आम्हाला अशी 7 शिळावर्तुळं आढळली असून यातली 3 वर्तुळं चांगल्या अवस्थेत आहेत. तर, उरलेली 4 वर्तुळं अखंड नाहीत."

घुमडे गावात आढळलेले माहापाषाणीय संस्कृतीतले शिळावर्तुळ

फोटो स्रोत, Amit Samant

फोटो कॅप्शन, अश्मयुगीन काळात माणसांच्या मृत्यूनंतर त्यासा दफन केलेल्या ठिकाणी त्यांच्या स्मृती जपण्यासाठी शिळास्मारकं उभारली जात असतं.

परब पुढे असंही सांगतात की, "मात्र ती शिळावर्तुळंच आहेत याची कल्पना येण्याइतपत ती व्यवस्थित आहेत. इथे स्मशान होते का याचा शोध घेण्यासाठी या शिळावर्तुळांमध्ये उत्खनन करावे लागते, अनेकदा अवशेष सापडतातही. मात्र तळ कोकणात प्रतिवर्षी होणाऱ्या तुफान पावसाने इथला मातीचा वरचा मोठा थर पूर्णपणे वाहून गेला असून सध्या पाहायला मिळते ते जांभा दगडाचे पठार किंवा सडा. तळ कोकणातल्या तुफान पावसामुळे या भागात पुरातत्वीय बाबी तुलनेने कमी सापडतात."

'सेक्रेड ऑलवेज अ सेक्रेड'

शिळावर्तुळांबद्दल अधिक माहिती देताना परब सांगतात, "मात्र पेंडूरच्या बाबतीत बोलायचे तर अजस्त्र असे हे शिळाखंड किंवा घुमड्याच्या बाबतीत शिळावर्तुळ पावसाच्या पाण्यात वाहून जाण्याचा प्रश्नच येत नाही. या शिळावर्तुळांच्या शोधाला अधिक बळकटी मिळण्यास महत्त्वाच्या ठरल्या, त्या इथेच सापडलेल्या काही मध्ययुगीन समाधी."

"ही शिळावर्तुळे आणि समाधी एकाच ठिकाणी आहेत. पुरातत्वामध्ये 'वन्स सेक्रेड ऑलवेज अ सेक्रेड' असं म्हटलं जातं. याचा अर्थ एखाद्या जागेचा विशेष किंवा त्याचं महत्त्व हे दीर्घकाळ मानवी पिढ्यांमध्ये सांस्कृतिक स्मृतीच्या माध्यमातून जपलं जातं," असं त्यांनी स्पष्ट केलं.

पुराअभ्यासक विनायक परब

फोटो स्रोत, Vinayak Parab / Facebook

फोटो कॅप्शन, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पेंडूर येथे पुरातत्व अभ्यासक विनायक परब यांना दोन महापाषाण युगीन शिळास्मारकं सापडली होती.

आधुनिक एपिजिनोमिक्स नावाची विज्ञानाची नवी शाखा असं सांगते की, ही सांस्कृतिक स्मृती आपल्या जनुकांमधून पुढील पिढीकडे संक्रमित होते. हीच जागा मध्ययुगामध्येही तत्कालीन पिढीने समाधीसाठी निवडण्यामागे हेच सांस्कृतिक स्मृतीचे गणित काम करत असल्याचं त्यांनी सांगितलं.

परब पुढे सांगतात, "सिंधुदुर्गातील पेंडूर इथे सापडलेल्या महापाषाणयुगीन संस्कृतीचे निदर्शक असलेल्या शिळास्मारकानंतर, पाषाणयुगाचे पुरावे आजूबाजूला आणखी सापडायलाच हवेत, असं सातत्यानं वाटत होतं. तसं गृहितकही मांडलेलं होतं. आता अमित सामंत यांच्या गावी घुमडे येथे सापडलेल्या अश्मयुगीन शिळावर्तुळांमुळे त्या गृहितकाला बळकटीच आली आहे. त्यामुळे कोकणाच्या प्राचिनत्त्वावर अधिक प्रकाश पडेल."

शिळावर्तुळं किंवा महापाषाणीय दफनांचा (स्मशान) इतिहास

ज्येष्ठ पुरातत्त्वज्ञ डॉ. मधुकर केशव ढवळीकर यांनी त्यांच्या भारताची कुळकथा या पुस्तकांत शिळावर्तुळं आणि महापाषाणीय दफने यांच्याबद्दलचे स्पष्टीकरण दिलं आहे.

घुमडे गावात महापाषाणीय संस्कृतीशी निगडीत असलेले हे अजून एक प्रकारचे स्मारक.

फोटो स्रोत, Amit Samant

फोटो कॅप्शन, घुमडे गावात महापाषाणीय संस्कृतीशी निगडीत असलेले हे अजून एक प्रकारचे स्मारक.

ढवळीकर लिहीतात, "महाराष्ट्रात महापाषाणीय दफने विदर्भात शेकडो आहेत. पुण्याजवळही काही आढळली आहेत. त्यांचा शोध डेक्कन कॉलजचे डॉ. ह. धी. सांकलिया यांनी लावला. विदर्भातील महापाषाणीय संस्कृतीचा सखोल अभ्यास डॉ. शां. भा. देव यांनी केला. तिथे खूप विस्तृत महापाषाणीय स्मशाने आहेत. ही सगळी शिळावर्तुळंच आहेत. त्यांचा व्यास 10-30 मीटर इतका आहे. शिळावर्तुळांची मधली जागा मृताचे अवशेष पुरण्यासाठी वापरली असते. ती प्रामुख्याने नागपूर, चंद्रपूर, भंडारा जिल्ह्यांत आढळतात."

ढवळीकर पुढे लिहीतात, "महापाषाणीय दफनांमध्ये सहसा आढळणारी पद्धत अशी की, मृत व्यक्तीस किंवा तिच्या अस्थी व इतर वस्तू पुरण्यासाठी पुरेसा होईल एवढा खड्डा खणला जात असे. खड्ड्यात मृत शरीर किंवा अस्थिकुंभ व त्यासोबत खापराची भांडी ठेवण्यात येत. या भांड्यांमध्ये मृतात्म्यांसाठी अन्नपाणी ठेवत असावेत. याखेरीज कुऱ्हाडी, तलवारी, खंजीर, घोड्याचे अलंकार यासारख्या लोखंडी वस्तूही ठेवल्या जात. अशा रीतीने पूर्ण सामग्री भरली की खड्डा मातीने बुजवला जाईल. त्यावर दगडधोंडे, माती यांचा एक ढिगारा रचला जात असे आणि त्याच्याभोवती थडग्याच्या जागी निदर्शक म्हणून 'शिळावर्तुळ' उभं केलं जात असे."

घुमडे गावात आढळलेली महापाषाणीय शिळावर्तुळे, समाध्या आणि मध्ययुगीन समाध्या, व्यापारी मार्गांचा हा नकाशा

फोटो स्रोत, Amit Samant

फोटो कॅप्शन, घुमडे गावात आढळलेली महापाषाणीय शिळावर्तुळे, समाध्या आणि मध्ययुगीन समाध्या, व्यापारी मार्गांचा हा नकाशा

मग, सिंधुदुर्गातील घुमडे गावात आढळलेली शिळावर्तुळं ही देखील स्मशानेच आहेत काय? असा प्रश्न परब यांना विचारला असता ते सांगतात, "घुमडे गावात आढळलेली ही स्मारकं जांभा खडकाच्या पठारावर आहेत. इथे पाऊस जोरदार होतो. त्यामुळे इथल्या शिळावर्तुळांवर असलेली माती वाहून गेली असावी. सध्या दिसत असलेलं शिळावर्तुळांचं स्वरुप हे स्मारकांप्रमाणे दिसत आहे. त्यामुळे सध्या तरी या शिळावर्तुळांना स्मशानं संबोधता येणार नाही. पण म्हणून ती स्मशानं नाहीत असंही म्हणता येणार नाही."

स्मारकं की स्मशानं?

घुमडे गावातील या शिळावर्तुळांच्या कालखंडाबद्दल जाणून घेण्यासाठी बीबीसीने मुंबईस्थित ज्येष्ठ पुरातत्वज्ञ डॉ. कुरुष दलाल यांच्याशी बातचीत केली.

दलाल सांगतात, "भारतात कर्नाटक आणि तामिळनाडूमध्ये इ.स.पूर्व 1000 ते इ.स. 300 या कालखंडात उभारण्यात आलेली अशी शिळावर्तुळे आढळली आहेत. महाराष्ट्रात पुण्यात आणि विदर्भात इ.स.पूर्व 600-700 या कालखंडात उभारण्यात आलेली शिळावर्तुळं दिसतात. हा सगळा कालखंड अश्मयुगानंतरचा कालावधी आहे. या काळात मृतांना पुरण्यासाठी स्मशानं उभारली जात. त्यात माणसांना पुरण्यात येत असे आणि त्याभोवती शिळावर्तुळं उभारण्यात येई. सध्या कोकणात आढळलेली शिळावर्तुळं ही स्मशानं असण्याची शक्यता नाकारता येत नाही."

घुमडे गावात इतिहासाच्या पाऊलखुणा

सिंधुदुर्गातील घुमडे गावात आढळलेल्या या शिळावर्तुळांचा माग काढणारे हौशी पुरातत्व अभ्यासक अमित सामंत यांनी त्यांच्या शोधाबद्दल बीबीसीला माहिती दिली.

शिळावर्तुळांची नोंदणी करताना हौशी पुराअभ्यासक अमित सामंत

फोटो स्रोत, Amit Samant

फोटो कॅप्शन, शिळावर्तुळांची नोंदणी करताना हौशी पुराअभ्यासक अमित सामंत

सामंत सांगतात, "2014मध्ये गिरिमित्र संमेलनात विनायक परब यांनी सिंधुदुर्गातील पेंडूरच्या महापाषाणयुगीन शिळास्मारकाबद्दल सादरीकरण केलं होते. त्यावरून प्रेरणा घेत मी माझ्या घुमडे या गावातल्या माळरानावर (सड्यावर) प्राचीन दगडांचा माग काढला. 2015पासून ही शोधमोहीम सुरू आहे."

"अशी 7 शिळावर्तुळं मला आढळली असून त्यांच्याबरोबरीनं दोन मध्ययुगीन समाध्या या गावात सापडल्या आहेत. यावरून कोकणाचा इतिहास अश्मयुगीन किंवा महापाषाणीय संस्कृतीपर्यंत मागे जात असल्याचं दिसून येतं," असंही सामंत यांनी सांगितलं.

घुमडे गावात आढळलेल्या मध्ययुगीन व्यापारी मार्गातील एका विहिरीकडे जाणारा मार्ग.

फोटो स्रोत, Amit Samant

फोटो कॅप्शन, घुमडे गावात आढळलेल्या मध्ययुगीन व्यापारी मार्गातील एका विहिरीकडे जाणारा मार्ग.

सामंत पुढे सांगतात, "त्याचबरोबर या घुमडे गावातून जाणारा मध्ययुगीन बांधीव व्यापारी मार्गही सापडला आहे. त्या मार्गावरील माल उतरवण्यासाठी असलेला धक्का, टोल/संरक्षणासाठी असलेली गुहा, कातळात खोदलेली घोडेबाव (step well) इत्यादी व्यापारीमार्गाला बळकटी देणार्‍या गोष्टी सापडलेल्या आहेत. त्याकाळी समुद्रामार्गे येणारा माल कोळंब खाडी मार्गे घुमडे गावातील व्हाळात (ओहळात) बांधलेल्या धक्क्यापर्यंत येत असे. तेथून जनावरांच्या पाठीवर सामान लादून बांधीव घाटमार्गाने माल सड्यावर येत असे व तेथून पुढे जात असे. हा घाटमार्ग बांधण्यासाठी चिर्‍याचे दगड वापरलेले आहेत."

जनावरांना चढण्याचा त्रास होवू नये यासाठी घाटमार्ग बनवताना पायर्‍या बनवलेल्या नाहीत ही विशेष लक्षात घेण्यासारखी गोष्ट आहे, अशीही माहिती सामंत यांनी दिली.

सांस्कृतिक स्मृतींचा वारसा

घुमडे गावात अश्मयुगीन ते मध्ययुगीन स्मारके आणि व्यापारी मार्ग आढळल्याने दोन कालखंडातील पुरातत्त्वीय अवशेष एकाच ठिकाणी आढळण्यामागचे गूढ काय? असा प्रश्नही आता उपस्थित झाला आहे.

घुमडे गावातील एका शिळावर्तुळाला स्थानिक ग्रामस्थ गवळदेव म्हणून पुजतात.

फोटो स्रोत, Amit samant

फोटो कॅप्शन, घुमडे गावातील एका शिळावर्तुळाला स्थानिक ग्रामस्थ गवळदेव म्हणून पुजतात.

या प्रश्नावर बोलताना परब सांगतात, "सांस्कृतिक स्मृतींचा वारसा मानवी संस्कृती वेळोवेळी जपत आल्याचं आजवरच्या इतिहासातून आढळून आलं आहे. अश्यमयुगीन स्मारके घुमडेमध्ये आढळली. त्याचबरोबर मध्ययुगातही नेमकी हीच जागा समाधींसाठी निवडण्यात आली आणि आज 21व्या शतकांत देखील यातील सर्वांत मोठे शिळावर्तुळ गवळदेव म्हणून पुजले जाते. यावरूनच ही सांस्कृतिक स्मृती आजतागायत सर्व पिढ्यांनी जपली आहे हे लक्षात येते."

अनेक ठिकाणी महाराष्ट्रामध्ये गवळदेव पुजला जातो. तिथे छोटेखानी शिळावर्तुळ तयार करण्याची प्रथा आहे. मात्र, इथे असलेली शिळावर्तुळे आणि यातील दगडांचे मोठे आकार, समाधी असलेल्या ठिकाणांशी त्याचे असलेले नाते हे थेट अश्मयुगाशीच जोडलेले आहे हे पुरते स्पष्ट करणारे आहे. अशीही माहिती परब यांनी दिली.

 https://www.bbc.com/marathi/india-45187961

 

marathi.indiatimes.com

पुरातत्त्वीय उत्खनने


शिल्पा हडप, डॉ. नितीन हडप
...................

नुकत्याच प्रदर्शित झालेल्या ‘मोहेंजोदडो’ या चित्रपटामुळे पुरातत्त्व व इतिहासकार यांच्या नेहमीच्या अभ्यासाचे, संशोधनाचे हे प्राचीन स्थळ सर्वसामान्यांच्या चर्चेचा विषय झाले आहे. चित्रपट करमणूकप्रधान आहे. चांगला की कसा हा विषय येथे गौण आहे. ‘जो बीत गया उसका सच तुम्हे बताना अनिवार्य है। नहीं तो आनेवाली पिढी कभी जान न पाएगी मोहेंजोदडो की अच्छाई और सच्चाई।’

अच्छाई माहीत नाही; परंतु ‘जो बीत गया उसका सच’ आणि ‘सच्चाई’ जाणण्याचे काम खऱ्या अर्थाने समाजातील जे लोक करतात त्यांना आपण पुरातत्त्वज्ञ (Archaeologist) म्हणून ओळखतो. सर्वसामान्य माणसांना पुरातत्त्वज्ञ, अशा प्रकारची प्राचीन स्थळे कशी शोधून काढतो? याबद्दल नेहमीच कुतूहल वाटत असते. प्राचीन स्थळे शोधून काढण्यासाठी सर्वेक्षण केले जाते. पाण्याच्या मुबलक साठ्याच्या काठावर मानव वस्ती करून राहतो, हे सर्वमान्य आहे. त्यामुळे हा मुद्दा सर्वेक्षणात लक्षात घेतला जातो. नद्यांच्या काठी प्राचीन काळी एकामागून एक वसाहती होऊन गेल्यामुळे तेथे अवशेषांचे एक ‘टेकाड’ बनते. या टेकाडांना भारतात वेगवेगळ्या प्रांतांमध्ये ‘दडो’ (मोहेंजोदडो, चन्दूदडो इ.), राजस्थानात ‘थोडी’ उत्तर भारतात ‘टिला’ (कंकाली टिला), गुजरातमध्ये ‘टिंबो’ (वहरवो टिंबो) आणि महाराष्ट्रात आपण ‘पांढरीची टेकाडे’ म्हणून ओळखतो. मानवाच्या शतकानुशतके झालेल्या वावरामुळे व घरातील चूल, शेकोटी वगैरेंच्या राखेमुळे मातीला पांढरट रंग आलेला दिसतो. म्हणून ती ‘पांढरीची टेकाडे.’

वर्षानुवर्षे ऊन-पावसाच्या माऱ्यामुळे गाडल्या गेलेल्या स्थळांचा काही भाग ढासळतो. त्यामुळे पुष्कळ वेळा आत असलेली खापरे, मणी, नाणी, हाडे वगैरे उजेडात येतात. त्या आधारे पुरातत्त्वज्ञ तेथे चाचणी उत्खनन करण्यास एखादा लहानसा; पण खोल खड्डा घेतो. त्यामुळे त्याला त्या प्राचीन ठिकाणचा मातीच्या स्तराच्या रंगावरून कालक्रम ठरवणे सोपे जाते. प्रत्यक्ष सर्वेक्षणापूर्वी प्राचीन वाड्.मय अभ्यासले. उदा. महाभारतातील उल्लेखिलेल्या स्थळांची यादी करून प्रा. बी. बी. लाल यांनी ती ठिकाणे आज कोठे आहेत हे शोधले. त्यामध्ये सोनपत (सुवर्णप्रस्थ), पानिपत (प्राणिप्रस्थ) इ. स्थळे होती. त्याप्रमाणेच दंतकथाही महत्त्वाचा दुवा ठरतात. उदा. संगमनेरजवळील जोर्वे या ठिकाणी पूर्वीची जरासंध नगरी होती, अशी दंतकथा आहे. त्यावरून हे ठिकाण प्राचीन असावे, असा कयास करण्यास वाव असतो. प्राचीन नगरीचे अवशेष बरेचदा अस्ताव्यस्त झालेले असतात. त्यामुळे स्थानिक लोक अशा ठिकाणाला ‘उलटनगरी’ असेही म्हणतात. याशिवाय प्राचीन लेखातील गावांची नावे, परकीयांच्या नोंदी, प्राचीन चित्रे-नकाशे अशांमधून पुरातत्त्वज्ञ संदर्भ घेऊन ठिकाणाचा शोध घेतो.

आधुनिक युगात हवाई सर्वेक्षण, उपग्रह चित्रणाद्वारे सर्वेक्षण करूनदेखील पुरातत्त्वज्ञ उत्खननासाठी ठिकाणाची प्राथमिक निवड करतो. काही ठिकाणांचे शोध अपघातानेच लागतात. आपण जाणतो, की मोहेंजोदडो हे त्याचे उत्तम उदाहरण आहे. हडप्पाचा शोध असाच अचानक लाहोर-दिल्ली रेल्वे रुळ टाकण्याच्या दरम्यान लागला. १९२२ मध्ये तेथे उत्खनन झाले आणि हडप्पा संस्कृतीचा शोध लागला. यालाच आपण सिंधू संस्कृती या नावानेही ओळखतो.

अगदी अलीकडच्या काळात राखीगढी (हरयाणा), वेजलका (गुजरात), शिकरपूर (गुजरात) इ. ठिकाणी हडप्पा संस्कृती संदर्भात उत्खनन होत आहे. या पूर्वीच्या मानवाच्या विकासाचा टप्पा म्हणजे अश्मयुगीन मानव. त्या दृष्टीने पुराश्मयुग, मध्याश्मयुग व नवाश्मयुग असे प्रागैतिहासाचे तीन कालखंड मानले जातात. त्यापैकी मध्याश्मयुगाचे अवशेष असलेले स्थळ वहरवो टिंबो येथे उत्खनन झाले आहे. फक्त अतिप्राचीन कालखंडाच्याच स्थळांचे उत्खनन होते असे नाही, तर ऐतिहासिक कालखंडाती‌ल गाडल्या गेलेल्या स्थळांचेदेखील उत्खनन होते. दक्षिण भारतातील किझदी हे स्थळ संगमसाहित्याच्या कालखंडातील आहे. तालपद हे ठिकाण ओरिसात असून, ऐतिहासिक कालखंडातीलच आहे. मध्य युगाच्या सांस्कृतिक अवशेषांच्या अभ्यासासाठी चांदोरे, महाराष्ट्र येथील अलीकडच्या काळातील उत्खनन महत्त्वाचे ठरेल.

कोणतेही उत्खनन करण्यापूर्वी भारतीय पुरातत्त्व विभागाची परवानगी व इतर कायदेशीर बाबींची पूर्तता करण्यात येते. उत्खनन साधारणपणे हिवाळ्यात म्हणजेच भारतातील हवामानाचा विचार करून करतात. प्रांतानुरूप बदल केले जातात. नोव्हेंबरपासून मार्चपर्यंत साधारणत: प्रत्यक्ष पुरातत्त्वीय अवशेषांच्या स्थळाचे उत्खनन होते. प्रमुख पुरातत्त्वज्ञ, सहाय्यक, प्रशिक्षक, विद्यार्थी आणि इतरही अनेक लोक मदत करतात. शास्त्रीय पद्धतीने उत्खनन करण्यासाठी उच्च दर्जाच्या प्रशिक्षणाची गरज असते. उत्खनने साधारणपणे दोन हंगाम ते सहा-सात हंगाम असे चालते. जेव्हा उत्खनन करता येत नाही, त्या काळात मिळालेल्या अवशेषांचा तौलनिक अभ्यास, लॅबोरेटरीमध्ये अवशेषांचे विश्लेषण उत्खननाचा अहवाल सादर करणे, उत्खननात मिळालेल्या वस्तूंचे शास्त्रीय पद्धतीने आरेखन केले जाते; तसेच मिळालेल्या अवशेषांचे संशोधन केले जाते. अशा अनेक गोष्टी मधल्या काळात केल्या जातात. एखाद्या साखळीसारखी ही प्रक्रिया असते.

२०११-२०१२ मध्ये वहरवो टिंबो, रणोदगाव, जिल्हा पाटण, गुजरात येथे महत्त्वपूर्ण उत्खनन झाले. महाराजा सयाजीराव विद्यापीठ, उत्तर गुजरात पुरातत्त्वीय प्रकल्प (NoGAP) यांच्या संयुक्त विद्यमाने हे उत्खनन झाले. हे स्थळ म्हणजे गुजरातमधील महत्त्वाच्या मध्याश्मयुगीन मानवी अवशेषांचे ठिकाण होय. तेथे उत्खननादरम्यान प्रामुख्याने दगडी लहान आकारातील शस्त्रास्त्रे आढळली आहेत. या संस्कृतीचा काळ अंदाजे इ. पू. ७००० वर्षे मानला जातो. लहान आकाराची धारदार दगडी पाती आढळली आहेत. काही दगडांवर रंगीत गिलावा आढळला आहे. तांबड्या-पिवळ्या रंगाच्या या दगडांना ‘पॅलेट स्टोन’ अशी संज्ञा आहे. या बरोबरच या उत्खननामध्ये हरणासारख्या प्राण्याच्या हाडांचे अवशेष मोठ्या प्रमाणावर आढळून आले आहेत. खापरेही भरपूर प्रमाणात मिळालेली आहेत आणि त्यात अभ्रकाचे घटक आढळले आहेत. या उत्खननाचे वैशिष्ट्य म्हणजे तेथे पूर्णत: मध्याश्मयुगीन संस्कृतीचे अवशेष आहेत. धातूच्या वापराचे कोणतेही अवशेष नाहीत. तसे असते, तर त्यास ताम्रपाषाणयुगीन म्हटले गेले असते. भटक्या अवस्थेतील मानवाने येथे काही काळ अन्नाच्या उपलब्धतेमुळे वस्ती केली, असे मानायला वाव आहे. पुढील संशोधन सुरू आहे.

२०१४-१५ मध्ये राखीगढी या हडप्पा संस्कृतीशी संबंधित प्राचीन नगराचे महत्त्वाकांक्षी उत्खनन केले गेले. मोहेंजोदडोपेक्षा या नगराचा विस्तार मोठा आहे; तसेच राखीगढीच्या सात टेकड्यांपैकी निवडक टेकड्यांचे उत्खनन केले गेले. या निवडीसाठी हवाई सर्वेक्षण व GPR सर्व्हे तंत्राचा वापर करण्यात आला होता. त्याप्रमाणे एकूण नगररचना लक्षात घेऊन पुरातत्त्वज्ञ डॉ. वसंत शिंदे व त्यांच्या टीमने सुनियोजित उत्खनन केले. डेक्कन कॉलेज पुणे, हरयाणा राज्य पुरातत्त्व विभाग व सोल राष्ट्रीय विद्यापीठ, दक्षिण कोरिया या तीन संस्थांच्या संयुक्त विद्यमाने हा प्रकल्प हाती घेण्यात आला होता. या उत्खननादरम्यान दोन टेकड्या नव्याने प्रकाशात आल्या. यापूर्वी १९६३ मध्ये पहिले, १९९७-२००० मध्ये अमरेंद्रनाथ यांच्या मार्गदर्शनाखाली दुसरे व २०१३-१४ पासून डॉ. वसंत शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली डेक्कन कॉलेजने उत्खनन केले. नव्या अवशेषांनुसार या संस्कृतीचा कालखंड इ. पू. ६००० वर्षे इतका मागे जातो, असा संशोधकांचा अंदाज आहे. धग्गर-हाक्रा नद्यांच्या भूप्रदेशात हे प्राचीन नगर वसले होते.

धग्गर-हाक्रा नद्यांच्या भूप्रदेशात वसलेले राखीगढ हे प्राचीन नगर सुनियोजित पद्धतीने वसलेले असून, इथे सांडपाण्याची उत्तम व्यवस्था होती. सात आयताकार धान्याची कोठारे सापडली असून, त्यांच्या भिंती चिखलाच्या विटांनी बांधलेल्या आहेत. जमीन चिखलाने सारवलेली आहे. त्यामध्ये गवत, चुन्याचे अवशेष जमिनीवर दिलेल्या गिलाव्यात आढळून आले. किटकांचा संपर्क होऊ नये म्हणून आणि गवत ओलेपणा, आर्द्रता शोषून घेण्यासाठी चुना वापरला असावा, असा पुरातत्त्वज्ञांचा अंदाज आहे. ही कोठारे आकाराने मोठी आहेत. त्यामुळे ती सार्वजनिक असावीत अथवा तत्कालीन श्रीमंतांची/उच्चभ्रूंची असावीत.

वस्तूंमध्ये प्रामुख्याने टेराकोट्टाच्या मूर्ती, ब्राँझच्या वस्तू, कंगवे, तांब्याचे मासे पकडण्याचे गळ, सुया व टेराकोट्टा सील्स सापडले. ब्राँझच्या भांड्यांवर सोने व चांदीचे नक्षीकाम आढळले आहे. धातूची भट्टी सापडली असून, तिथे ३०० सेमी मौल्यवान दगड सापडले आहेत. त्यांना पॉलिश केलेले नाहीत; परंतु या दगडांना पॉलिश करण्याची हत्यारेही सापडलेली आहेत. सर्वांत महत्त्वाची गोष्ट म्हणजे तेथे आढळलेली स्मशानभूमी. तेथे एकूण पंधरा मानवी सांगाडे दफन केलेले आढळून आले. त्यांच्या डोक्याजवळ रोजच्या वापरातील भांडी मिळाली. स्त्र‌ियांच्या तीन सांगाड्यांच्या डाव्या हातात शंखांच्या बांगड्या आहेत. एका स्त्रीच्या सापळ्याजवळ सोन्याचा दागिना मिळाला. डोक्याजवळ काही सेमी मौल्यवान दगडही मिळाले. याशिवाय इथे लहान आकाराची चाके, लहानशी झाकणे, चेंडू, प्राण्याच्या आकाराची खेळणी आढळली आहेत. प्रमाणित वजने आढळली आहेत. पंधरा सापळ्यांपैकी एक लहान मुलाचा आहे. त्यांच्याजवळ असलेल्या भांड्यांमध्ये धान्याचे कण आढळून आले. अत्यंत शास्त्रशुद्ध पद्धतीने सांगाड्यांमधील DNA मिळविण्यात आलेले असून, परिक्षणासाठी सेंटर फॉर सेल्यूलर अँड मोलिक्युलर बायोलॉजी हैदराबाद, हावर्ड विद्यापीठ आणि सोल नॅशनल विद्यापीठ, साऊथ कोरिया यांच्याकडे पाठवण्यात आले आहेत. या DNA च्या परिक्षणांवरून अनेक नवे सिद्धांत प्रकाशत येऊ शकतील.

सिंधू संस्कृतीचे राखीगढी हे जसे प्रचंड मोठे नगर सापडले; तसेच तत्कालीन ग्राम्य संस्कृतीचे अवशेषदेखील आढळून आले आहेत. २०१६ मध्ये वेजलका या गावाजवळ महाराजा सयाजीराव विद्यापीठाच्या पुरातत्त्व व प्राचीन इतिहास विभागाने संशोधन व उत्खनन केले. इ. पू. ४,३०० या कालखंडातील ग्राम्य संस्कृती दाखवणारे हे पुरातत्त्वीय स्थळ होय. मानवी वस्ती आणि लहान प्रमाणात औद्योगिक वसाहत वेजलका गावात होती. सौराष्ट्रातील रणकपूर तालुका जिल्हा बोटड येथील हे उत्खनीत स्थळ होय. प्रो. एस. प्रतापचंद्र व प्रा. के. कृष्ण या प्रमुख पुरातत्त्वज्ञांनी हा प्रकल्प हाती घेतला होता. ग्रामीण अर्थकारण हा नागरी अर्थकारणाचा पाया मानला जातो. हा सिद्धांत लक्षात घेऊन वेजलका या साइटचे उत्खनन करण्यात आले. या उत्खननाच्या दरम्यान विविध स्तरांमध्ये जॅस्पर, अॅगेट, चाल्सीडोनी इ. दगडी लहान आकाराची क्षुद्रास्त्रे मिळाली. गांधीनगरच्या भूकंप संशोधन केंद्राच्या OSL पद्धतीने कालमापन केले असता हा कालखंड अंदाजे ७००० इ. पू. मागे जातो असे मानले जाते. खापराच्या तुकड्यांमध्ये अभ्रकाचे प्रमाण मोठ्या प्रमाणावर आढळून आले. एकट्या सौराष्ट्रातच हडप्पा संस्कृतीच्या १९०पेक्षा जास्त साइटस् आढळून आल्या आहेत. संस्कृतीचा विकास व अर्थकारण या दोन्हींचा अभ्यास वेजलका सारख्या पुरातत्त्वीय उत्खनन स्थळांच्या स्तरशास्त्रावरून करता येतो.

येत्या चार-पाच वर्षांमध्येच सिंधू संस्कृतीच्या उत्खनन संशोधनास शतक पूर्ण होत आहे. आपल्या आजूबाजूला कोणत्या स्वरूपाचे पुरातत्त्वीय संशोधन सुरू असते याचे भान असले, की आपला सांस्कृतिक दृ‌ष्टिकोन व्यापक व विस्तृत होत जातो. गुजरातमधील शिकरपूर येथे २०१२-१३ मध्ये उत्खनन करण्यात आले. त्यामध्ये हडप्पा संस्कृतीमधील स्टिएटाइट माध्यमातील मुद्रा आढळून आली आहे. या मुद्रेवर सिंधुलिपी व गेंड्याचे अंकन आहे. GPR सर्व्हे तज्ज्ञांचा वापर करून प्रत्यक्ष उत्खननात ५ मीटर बाय ५ मीटरचे पाच खड्डे घेण्यात आले. शिकरपूर स्थळाच्या वस्तीच्या परिघावर तटासारखी जाड भिंत दहा मीटर जाडीची आढळली आहे. कच्छ प्रांतातील मध्यम आकाराच्या या साइटचे उत्खनन गुजरात विद्यापीठ, राज्य पुरातत्त्व विभाग व व्हिस्कॉन्सिन विद्यापीठातर्फे करण्यात आले.

पुरातत्त्व विभागातर्फे दक्षिण भारतात वैगई नदीच्या दोनही तीरांवर मोठ्या प्रमाणावर सर्वेक्षण २०१२-१३ मध्ये करण्यात आले. या वर्षभर संगमसंहितामध्ये आढळणाऱ्या वस्तीस्थानांचा शोध झालेल्या सर्वेक्षणात घेण्यात आला. अंदाजे २९३ स्थळांची नोंद घेण्यात आली व त्यापैकी ‘कीझडी’ या ठिकाणी २०१३-१४ मध्ये उत्खनन करण्यात आले. तेव्हा दोन वसाहती आढळून आल्या. समाजातील स्तरवारी त्यामध्ये दिसून येते. तेथे दागिने, चांगल्या अवस्थेतील बांधकामे आढळून आली आहेत. रोमशी या प्रदेशाचे व्यापारी संबंध असल्याचा पुरावाही आढळून आला आहे. उल्लेखनीय बाब म्हणजे काही खापरांच्या तुकड्यांवर संगम तमिळ काळातील (इ. स. पूर्व ३ रे शतक) तमिळ-ब्राह्मी लिपीतील लेख आढळले आहेत. त्यापैकी काहींवर भिसन, अधन, अधिरन अशी नावे आहेत. कीझडीचे उत्खनन के. अमरेंन्द्रनाथ कृष्णन व डॉ. व्ही. वदचलम यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले.

प्राचीन भारतातील इतिहास काळातील ‘तालपद’ या स्थळाचे उत्खनन प्रा. आर. के. मोहंती, डॉ. पी. पी. जोगळेकर यांनी २०१३-१४ व २०१४-१५ अशा दोन भागात केले. ओरिसा राज्यातील या पुरातत्त्वीय स्थानाचे वैशिष्ट म्हणजे शिशुपालगड या प्रसिद्ध पुरातत्त्वीय स्थळाप्रमाणेच या नगराची रचना आढळून आली आहे. फक्त ते आकाराने लहान आहे. चौरसाकारात वस्ती असलेले हे ठिकाण मालगुनी नदीच्या उजव्या तीरावर आहे.

चांदोरे हे कोकणातील ऐतिहासिक स्थळ मुंबई विद्यापीठाच्या ‘सेंटर फॉर एक्स्ट्रा मोरल स्टडीज’ व ‘इंडियन स्टडी सेंटर’ या संस्थांच्या संयुक्त विद्यमाने २०१२ ते २०१५ अशा काळात उत्खनन कार्य चांदोरेला झाले. पुरातत्त्वशास्त्र हे फक्त प्रागैतिहासिक, हडप्पा संस्कृतीसारख्या इतिहासपूर्व काळापुरतेच मर्यादित नसते, तर मध्ययुगीन काळामधील मानवी संस्कृतीच्या अभ्यासासाठीही त्याचा उपयोग होत असतो, हे पुन्हा एकदा ‌अलीकडच्या काळात लक्षात आणून देण्याचे कामही चांदोरे निमित्ताने डॉ. कुरुष दलाल यांनी केले आहे, असे मानले जाते. चांदोरे या स्थळाचा काळ हा इ. स. चे ८ वे शतक इतका मागे जातो. शिलाहार राजवटीच्या काळी तेथे व्यापार चालत असे. देशांतर्गत व्यापार कसा होता, त्यावरही त्यामुळे प्रकाश पडला आहे. हरगौरीची मूर्ती तेथे आढळून आली आहे. तेथे क्षुद्रास्त्र शस्त्रे सापडली आहेत. त्यावरून काळ आणखी मागे जाऊ शकतो. स्थानिक लोककथा पुरातत्त्वात नेहमीच महत्त्वाचा दुवा होतात. चांदोरेच्या या परिसराला स्थानिक लोक ‘कलावंतिणीचे घरटे’ म्हणून संबोधतात. स्थानिक लोक परंपरेप्रमाणे याचा अर्थ ‘सर्व आवश्यक सोयी व्यापारीवर्गाला उपलब्ध करून देणारे मध्यवर्ती ठिकाण’ असा होतो. ११ व्या शतकातील एक नाणे, काचेचे मणी, काचेच्या बांगड्या, १४ व्या शतकातील एकाच रंगात रंगवलेली भांडी अशा प्रकारचे इतर ऐतिहासिक पुरावेदेखील आढळून आले आहेत. पुढील अभ्यास येथे सुरू आहे.

पुरातत्त्व विभाग, विविध विद्यापीठे, स्वायत्त संस्था, परदेशी विद्यापीठे एकत्र येऊन पुरातत्त्वीय उत्खनने चालत असतात. अनेक क्षेत्रातील तज्ज्ञांचे योगदान या शाखेला असल्यामुळे पुरातत्त्व संशोधन व उत्खनन ही शाखा खऱ्या अर्थाने ‘मल्टी डीसिप्लिनरी स्टडीज’ म्हणतात अशी आहे. उत्खनन व त्यावरील संशोधन, अहवाल या बरोबरच त्याचे जतन हे मात्र भारतासारख्या देशात पुरातत्त्वज्ञांना मोठे आव्हान होऊन बसते. हे स्वरूप मात्र जगभर वेगळे आहे.

weeklysadhana.in

महाराष्ट्रातील उत्खनने

शोभना गोखले

डॉ. शां. भा. देव 
पब्लिकेशन डिव्हिजन, दिल्ली 
अडीच रुपये

अलिकडे नुकतीच मुळामुठेवर अश्मयुगीन हत्यारे सापडली आहेत. त्यापूर्वीच गोदावरीकाठी व प्रवरेकाठी ती सापडली होती. या दोन नद्यांच्या आसमंतांतच महाराष्ट्राचा आदिमानव सापडण्याची आशा डॉ. देव यांनी व्यक्त केली आहे.
 

1961 हे साल पुराणवस्तु संशोधन- खात्याच्या संवत्सराचे वर्ष होते. त्यानिमित्त व्याख्यानमालेच्या संचालकांनी पुरातत्वशास्त्रावर व्याख्यानमाला गुंफण्यात व त्या विषयात दर्दी व मातबर असलेल्या डॉ. शां. भा. देव यांची नियुक्ति करण्यात औचित्य दाखविले आहे.

‘जुने जाऊ द्या मरणालागुनी’ असे जरी कवींनी म्हटले असले तरी ऐतिहासिक वास्तु व स्फूर्तिस्थाने यांची जपणूक करणे हे राष्ट्राच्या सांस्कृतिक उत्कर्षाचे एक प्रमुख अंग असते. सांस्कृतिक संघर्षामुळे अथवा जलप्रलयसदृश नैसर्गिक आपत्तींमुळे लोकजीवन उद्वस्त झाल्याचे आपण वाचतो. परंतु भूमाता त्याच्या खुणा साक्षेपाने आपल्या पोटात जपून ठेवते याची आपल्याला तेवढीशी जाणीवहि नसते. तिचे मनोगत जाणण्याचे लाघव उत्खननशास्त्राला आहे.

डॉ. देव यांनी आपल्या पहिल्या व्याख्यानात पुराणवस्तु संशोधनाचा उद्भव कसा झाला आणि इंग्रजी अधिकाऱ्यांच्या जिज्ञासेतून या शास्त्राची प्रगति कशी झाली हे सांगितले आहे. भारतातील प्राचीन अवशेषांचा अभ्यास करण्यासाठी 1784 साली सर विल्यम जोन्स यांनी कलकत्त्याला एशियाटिक सोसायटीची स्थापना केली. मुंबई व मद्रास येथेहि अशाच तऱ्हेच्या संस्था स्थापन करण्यात आल्या. जेम्स प्रिन्सेप यांनी ब्राह्मी व खरोष्ठी लिप्या वाचल्या म्हणून मौर्य सम्राट अशोक यांच्या शिलालेखांचे वाचन करणे शक्य झाले.

कनिंगहॅमच्या कारकिर्दीत उत्तर भारतातील बौद्ध अवशेषांचाच विशेषेकरून अभ्यास झाला. मौर्यकालीन दगडांचे अखंड स्तंभ, बौद्ध स्तूप, तक्षशिला, कोशांबी, श्रावस्ती या प्राचीन नगरांचा शोध कनिंगहॅम यांच्याच कारकिर्दीत लागला. गुप्त सम्राटांचे शिलालेख प्रकाशात आले. कॅनिंगहॅमनंतर सर जॉन मार्शल यांनी सिंधुसंस्कृतीचे दालन जगाला उघडून दाखवून मोठी क्रांति केली. या संस्कृतीचा शोध मार्शल यांनी उत्खननतंत्राचा अवलंब करून लावला. उत्खननशास्त्राला मान्यता प्राप्त करून देण्याचे श्रेय सर मॉर्टिमर व्हीलर यांनाच आहे. या तंत्रशुद्ध शास्त्राचा अवलंब करून भारतात विविध ठिकाण उत्खनने झाली. डॉ. देव यांनी भारतातील अश्मयुगापासून रोमन संपर्काच्या काळापर्यंतचा आढावा पहिल्या व्याख्यानात घेतला आहे.

या पार्श्वभूमीवरच महाराष्ट्रात नेवासे, नासिक, कोल्हापूर दायमाबाद, प्रकाशे, जोर्वे इत्यादि ठिकाणी झालेल्या उत्खननातून सापडलेल्या अवशेषांवरून अश्मयुगापासून तो तहत मुसलमानी काळापर्यंत लोकजीवन कसे होते याचे मूर्तिमंत चित्र दुसऱ्या व्याख्यानात उभे केले आहे. अश्मयुगातील मानवी जीवनाचा अभ्यास करण्यास तत्कालीन दगडी हत्यारे हे एकमेव साधन उपलब्ध असते. परंतु ताम्रपाषाणयुगानंतर माणसाने बनविलेली घरेदारे, भांडीकुंडी, अलंकार, दफन पद्धति, धान्य या गोष्टी उपलब्ध होतात. या सर्वांतून त्या त्या काळाचे सांस्कृतिक चित्र कसे निर्माण होते हे व्याख्यात्यांनी मोठ्या मनोरंजकतेने सांगितले आहे.

साध्या खापराच्या तुकड्यांतून मानवी कर्तृत्त्वाचा कसा साक्षात्कार होतो हे बघण्यासारखे आहे. कुंभार मातीची भांडी करताना धान्याचा भुसा मिसळतो. या जळालेल्या अवशेषांवरून तत्कालीन धान्याचा मागोवा लागतो. खापरावरील चित्रविचित्र नक्षीवरून तत्कालीन समाजाची कलाविषयक माहिती लागते. दायमाबाद येथे सांपडलेल्या माठावर महाराष्ट्राच्या प्राथमिक चित्रकलेचा पुरावा सापडतो. त्या माठावर एक मानवी आकृति आहे. ती आपल्याकडे मोर व हरणे आकृष्ट करीत असल्याचा व वाघासारखे प्राणी दूर जात असल्याचा देखावा आहे.

खापराप्रमाणे तत्कालीन वास्तू, उत्खनित सांगाडे, नाणी, अलंकार व असे अनेकविध पुरावे सांस्कृतिक मूल्यमापन करताना उपयोगी पडतात. उत्खनित वास्तूवरून नगररचना, वास्तूबद्दलचे संकेत यावर चांगला प्रकाश पडतो. उत्खनित सांगाड्यावरून वांशिक साधर्म्याचा आणि मानवी स्थलांतराचा अंदाज मानववंश शास्त्रज्ञाला घेता येतो. फुलपाखरू, कासव, बेडूक, मगर यांच्या आकृतीचे मणी उत्खननात सापडले आहेत. असे अनेक पुरावे डॉ. देव यांनी या व्याख्यानात स्पष्ट केल्यामुळे प्राचीन काळात लोकजीवन कसे होते ते चांगले समजते.

अलिकडे नुकतीच मुळामुठेवर अश्मयुगीन हत्यारे सापडली आहेत. त्यापूर्वीच गोदावरीकाठी व प्रवरेकाठी ती सापडली होती. या दोन नद्यांच्या आसमंतांतच महाराष्ट्राचा आदिमानव सापडण्याची आशा डॉ. देव यांनी व्यक्त केली आहे. ताम्रयुगीन संस्कृतीच्या लोकांची स्थलांतरे, त्यांचा उगम, आर्यांशी संबंध या सर्वांचे मूल्यमापन करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर उत्खनने करणे कसे आवश्यक आहे हि व्याख्यात्यांनी सांगितले आहे.

उत्खननशास्त्र हा क्लिष्ट विषय आहे असा लोकांचा ग्रह आहे. या शास्त्रासंबंधी सोप्या व सुंदर भाषेत लिहिलेला हा पहिलाच मराठी ग्रंथ आहे. प्रस्तुत ग्रंथांतील विवेचनावरून पुराणवस्तु संशोधकांपुढे कोणत्या समस्या उभ्या असतात याची चांगली कल्पना येते.

 

lokmat.com

अमरावती येथील अंबादेवी मंदिर परिसरात आढळले अश्मयुगीन चित्रगुहेतील 'सप्तपदी कमळ’

गणेश वासनिक

अमरावती : येथील प्राचीन अंबादेवी मंदिर परिसरातील एका चित्रावरून एक अत्यंत वेधक शाेध लागला आहे. या चित्रगुहेच्या दगडी भिंतीवरील चित्रात एक सात पाकळ्यांचे कमळ स्वतंत्रपणे कोरले गेले आहे. विशेष म्हणजे यातील प्रत्येक पाकळी योनीच्या स्वरूपात आहे. ज्यामध्ये चार पाकळ्या वरच्या दिशेने आणि तीन पाकळ्या खालच्या दिशेने दिसत आहेत. या अश्मयुगीन चित्रगुहेत 'सप्तपदी कमळा'चा शोध असल्याची माहिती संशोधक डॉ. विजय इंगोले यांनी दिली आहे.

डॉ. विजय इंगोले यांच्या नेतृत्वात अमरावतीच्या सहा निसर्ग संशोधकांनी मोर्शीपासून अवघ्या ७५ किलोमीटर अंतरावर असलेल्या सातपुडा पर्वतरांगेत २००७ साली जवळपास ३५ हजार वर्षापूर्वीच्या अश्मयुगीन चित्रगुहांचा सर्वप्रथम शोध लावला होता. ही बाब सर्वश्रुत आहे. या चित्रांचे अद्यापही या चमूव्दारे संशोधन आणि अभ्यास सुरू आहे.

योनीस्वरूप पाकळ्यांनी कोरलेल्या कमळाचा हा शोध अनेक गहन प्रश्न निर्माण करतो. याचे कारण म्हणजे योनी प्रजनन दर्शवते. यात ठळकपणे सात पाकळ्यांचे कमळ आहे, ज्याला सप्तपदी कमळ किंवा सात पायऱ्यांचे कमळ म्हणून ओळखले जाते. ज्याला हिंदू धर्मात खूप महत्त्व आहे. प्रत्येक पाकळीचा मूळ आधार चक्र, स्वाधिष्ठान चक्र, मणिपुरा चक्र, अनाहत चक्र, विशुध्द चक्र, अजना चक्र म्हणजेच पृथ्वी, पाणी, अग्नी, वायू, आकाश, विवेक आणि समाधी आहे. कमळ हे पावित्र्य, देवत्व, आत्मज्ञान आणि सृष्टीच्या शाश्वत चक्राचे प्रतिनिधित्व करणारे एक आदरयुक्त प्रतीक आहे. 

हिंदू पौराणिक कथा, विधी आणि प्रतिमा शास्त्रातील त्याची उपस्थिती हिंदू संस्कृतीच्या धार्माक आणि आध्यात्मिक सारामध्ये त्याची अविभाज्य भूमिका अधोरेखित करते. त्याचे अंदाजे वय संभाव्यतः ४००० इस. पूर्व वैदिक काळाशी जोडलेले असावे. उल्लेखनीय शैला, स्त्रीत्व आणि निर्मितीच्या प्रतीकांसह त्याचा संबंध ती एक महत्त्वपूर्ण पुरातत्त्व कलाकृती म्हणून स्थापित करते. या गूढ शोधाच्या सभोवतालचे सांस्कृतिक आणि ऐतिहासिक संदर्भ समजून घेण्यासाठी विस्तृत तपासणी आणि विश्लेषण महत्त्वपूर्ण ठरेल. पुरातत्त्व भाषाशास्त्र आणि सांस्कृतिक अभ्यासातील तज्ज्ञ या अनोख्या प्रतिनिधित्वामागील अर्थ आणि महत्त्व उलगडण्यासाठी महत्वपूर्ण ठरतील. संशोधक डॉ. विजय इंगोले यावर एक संशोधन पेपरही तयार करीत आहेत. निसर्ग संशोधकांच्या चमूतील इतर वन्यजीव सदस्यांचे या संशोधनात महत्वपूर्ण योगदान आहे.

 

thinkmaharashtra.com

इतिहासापासून अश्मयुगापर्यंतचा वारसा… | थिंक महाराष्ट्र

See author's posts

_Itihasapasun_Ashmayugaparyantcha_1.jpg

शांतिलाल पुरवार यांचा आगळा संग्रह

औरंगाबादचा पुरवार कुटुंबियांचा वंशपरंपरागत वाडा हा घर कमी आणि संग्रहालय जास्त भासतो. दहा पिढ्या नांदलेल्या त्या घरामध्ये औरंगाबाद जिल्ह्याचा आणि त्याहूनही मोठ्या पातळीवर सतरा हजार वस्तूंचा सांस्कृतिक वारसा जतन करण्यात आला आहे. त्या वारशाचा संबंध काही दशकां-शतकांपूर्वीच्या वस्तूंसोबत आहेच, पण काही संदर्भ थेट हजारो वर्षांपूर्वीच्या आदिमानवापर्यंतदेखील जाऊन भिडतात- औरंगजेबाने लिहिलेल्या ‘कुराण-ए-शरीफ’पासून अश्मयुगीन मानवाच्या अंगठ्याचा ठसा असलेल्या दिव्यापर्यंत… ‘थिंक महाराष्ट्र डॉट कॉम‘ गावागावांत दडलेला असा सांस्कृतिक वारसा नोंदवण्याचा प्रयत्न करत आहे.

औरंगाबाद येथील छंदवेडे व ध्येयवेडे डॉ. शांतिलाल पुरवार यांनी दुर्मीळ वस्तूंच्या संग्रहासाठी आयुष्य वेचले. त्यांनी स्वखर्चाने एकेक ऐतिहासिक वस्तूचा संग्रह केला. त्यांचे देहावसान काही वर्षांपूर्वी झाले, परंतु त्यांचे चिरंजीव श्रीप्रकाश पुरवार आणि त्यांचे दोन भाऊ हे त्यांच्याच पावलावर पाऊल ठेवून वडिलांचा वारसा समर्पित भावनेने जपत आहेत.

शांतिलाल पुरवार यांच्या संग्रहात सतरा हजार पुराणवस्तू आहेत. त्यांनी त्या संग्रहाला ‘मातोश्री कौशल्या पुरवार म्युझियम’ असे नाव दिले आहे. त्यांचा तो संग्रह पुरवार कुटुंबियांच्या वंशपरंपरागत वाड्यात जपून ठेवलेला आहे. संग्रहालयात अश्मयुग ते ब्रिटिश कालावधीपर्यंतच्या दुर्मीळ वस्तू आहेत. तो संग्रह अनमोल तर आहेच, परंतु त्यातील काही वस्तूंचा ठेवा हा अतिप्राचीन, वैशिष्ट्यपूर्ण व विविधता जपणारा आहे. संग्रहात सोळा दालने विषयवार आहेत.

_Itihasapasun_Ashmayugaparyantcha_3.jpgपहिले दालन हे धर्म व ईश्वर त्याचप्रमाणे देवदेवता यांवर आहे. त्यात सर्व धर्मांचे तत्त्वज्ञान, ईश्वराची संकल्पना- त्यावर आधारित दुर्मीळ पुराणवस्तू व ग्रंथ आहेत. त्यामध्ये औरंगजेबाने स्वत:च्या हाताने लिहिलेले ‘कुराण -ए-शरीफ’ आहे. शिवाय, हस्तलिखित गुरूचरित्र व इतर धार्मिक ग्रंथ आहेत.

दुसरे दालन हे पाषाणयुगी वस्तूंचे आहे. त्यात औरंगाबाद परिसरातील पुराणमानव वापरत असलेली दगडाची (जॅस्पर) हत्यारे, मातीचे (टेरा कोटा) दिवे टेरा कोटा हे सातवाहनकालीन पेण्टल तेथे पाहण्यास मिळते. अश्मयुगीन मानवाच्या अंगठ्याचा ठसा असलेला दिवाही तेथे आहे.

तिसरे दालन आहे निसर्गाचे! त्यात प्रामुख्याने संस्कृतीच्या उदयाचे अवशेष-जीवाश्म वनस्पती फॉसिल स्वरूपात मांडल्या आहेत. त्यात हडप्पापूर्व व हडप्पानंतरच्या कालखंडाची माहिती मिळते. त्यात भारतीय संस्कृतीचा उदय, प्रगती, राज्य संकल्पना, संस्कृतिविकास दाखवला आहे. सातवाहन, गुप्त, कुशाण, वाकाटक, चालुक्य, राष्ट्रकुट या राजवटींची माहिती मिळते व तत्कालीन वस्तूही पाहण्यास मिळतात. चौथे दालन शिल्पांचे असून त्यात मृण्मूर्ती, पाषाणशिल्पे, धातू-ब्राँझ-काष्ठशिल्पे आहेत. त्यात स्फटिक, रतन, चांदी, तांबे यांच्याही मूर्ती आहेत. त्या दालनात तेवीसशे वर्षांपूर्वीची यक्षिणीची ब्राँझची मूर्ती आहे. फक्त बेल्जियमच्या ब्रुसेल्स संग्रहालयात आढळणारी, हयग्रीवाची मूर्तीही तेथे आहे. तसेच, नालंदा विद्यापीठात तयार झालेली टेराकोटाची बुद्धमूर्ती, यादवकालीन मूर्ती, सम्राट कृष्णदेवराय यांच्या काळातील नागदेवतेची मूर्ती, स्फटिकाचा नृसिंह, सायफनचा (जलवहनाचे तंत्र) हत्ती आदी तर आहेच; त्याचबरोबर, जहर मोहरा (द्रव्य पदार्थात विष असेल तर जहर मोहरा ताबडतोब रंग बदलतो) आदी वस्तू आहेत. पाचवे दालन चित्रांचे असून, त्यात कागद, हस्तिदंत, काच यांवरील मुघल व राजपूत शैलीतील चित्रे आहेत. तसेच, अजिंठा लेण्यांतील चित्रांच्या प्रतिकृती, नक्कल, लघुचित्रेही आहेत. सहावे दालन हस्तलिखित पोथ्यांचे आहे. सात विविध धर्म व भाषांतील सचित्र पोथ्या, ग्रंथ आदी तेथे आहेत. त्यात प्राकृत, फारशी, अरबी, उर्दू ग्रंथ आहेत.

_Itihasapasun_Ashmayugaparyantcha_2.jpgसातव्या शस्त्रास्त्रे दालनात आदिमानवी काळापासूनची शस्त्रे आहेत. त्यांतून आदिमानवाचा विकास कळून येतो.

दांडपट्ट्यासहित सोळा प्रकारच्या तलवारी त्या ठिकाणी आहेत. ग्रीक-अरबांच्या इसवी सनापूर्वीच्या शुद्ध पोलादाच्या भारी तलवारी त्यात आहेत. हलक्या आणि वजनदार धातूंची शस्त्रे तेथे पाहण्यास मिळतात. आठवे दालन – नाणी, मुद्रा, शौर्यपदके यांनी भरलेले आहे. इसवी सनपूर्व सहाशे वर्षांपासून आजपर्यंतची नाणी तेथे दिसतात. नववे दालन काष्ठशिल्प व काष्ठ कामाचे असून, त्यात जुन्या शैलीनुसार वास्तुशिल्पातील लाकडी खांब, कोपरे, कमानी, लाकडी मूर्ती अशी कलाशिल्पे आहेत. दहावे दालन विविध प्रकारच्या मण्यांचे आहे. तेथे इसवी सनपूर्व तीनशेपासून ते विविध कालखंडातील आभूषणांत वापरले गेलेले मणी आहेत. अकरावे दालन वस्त्र-प्रावरणांचे आहे. त्यामध्ये मराठे, राजपूत, मोघल यांच्या काळातील पोषाखांपासून ते पेशवाईपर्यंतची वस्त्रे आहेत. त्यात मुख्य आकर्षण अर्थातच सातवाहन काळातील पैठण ते रोम, ग्रीस, इजिप्तपर्यंत गेलेली पैठणी हे आहेच. त्यावर सुवर्णकाम आहे. बारावे दालन महिलावर्गाचे आकर्षण ठरावे असे आहे. त्यामध्ये रत्नांचा, आभूषणांचा संग्रह आहे.

आदिवासींच्या वस्तूंचा संग्रह तेराव्या दालनात आहे. चौदावे सौंदर्य कलादालन असून त्यात विविध काळातील दिवे, गृहोपयोगी वस्तू आहेत. काचेच्या वस्तू, गंजिफा, दौती ही आकर्षणे ठरतात. पंधरावे संगीत दालन आहे. त्यात वेगवेगळ्या वाद्यांचा संग्रह आहे. सोळावे आयुर्वेद दालन असून, त्यात प्राचीन काळापासून वापरात असलेला वनस्पती; तसेच, त्या संबंधीचे प्राचीन ग्रंथ यांचा संग्रह आहे. त्याशिवाय युवादालन, आशिया दालनात परदेशातील वस्तूंचा संग्रह आहे. परदेशातील नाणी व चलन यांचाही संग्रह आहे. बिद्री कलावस्तूंचेही वेगळे दालन आहे.

संग्रहाचे निर्माते शांतिलाल पुरवार हे पेशाने डॉक्टर होते. ते हौसेने शिल्पकला करत. मात्र त्यांना डोळ्यांचा आजार होण्याचे निमित्त झाले आणि त्यांच्या छंदाला वेगळे वळण मिळाले. शांतिलाल यांना भारतीय संस्कृतीच्या कलात्मक वारशाचा शोध घ्यावासा वाटू लागला. त्या इच्छेपायी त्यांनी औरंगाबाद जिल्हा, मराठवाडा आणि इतर परिसरात भटकंती सुरू केली व पुराण वस्तूंचा खजिना जमा केला. त्यांनी प्रसंगी वस्तू विकत घेतल्या. त्यांचा शोध जिज्ञासेतून शिल्पकला-चित्रकला यांच्या पलिकडे जाऊन विविध गोष्टींपर्यंत पोचला.

_Itihasapasun_Ashmayugaparyantcha_5.jpgपुण्यातील केळकर संग्रहालयाचे कर्ते दिनकर केळकर हे शांतिलाल यांचे समकालिन. शासनाने केळकर संग्रहालयाची जबाबदारी स्वीकारली, तेव्हा केळकर यांच्याकडे तीनशे वस्तू होत्या, तर त्याचवेळेस शांतिलाल यांच्याकडे सहाशे वस्तूंचा संग्रह होता. शांतिलाल पुरवार आणि केळकर यांचा चांगला परिचय होता. केळकर यांच्या संग्रहालयाच्या उभारणीमध्ये शांतिलाल यांचे सहकार्य होते. शांतिलाल यांनी केळकर यांना औरंगाबादवरून अडीच ट्रक भरून लाकूड पुरवले होते. औरंगाबादला निजामाचे दिवाण राजाकिसन प्रसाद यांचा वाडा होता. त्याचा मोठा लाकडी दरवाजा शांतिलाल यांनी केळकरांना दिला असल्याची आठवण श्रीप्रकाश सांगतात. तो दरवाजा केळकर संग्रहालयात पाहता येतो. श्रीप्रकाश ती माहिती देताना थोडे बिचकतात. ते म्हणतात, या घटनांची कसलीही नोंद कागदोपत्री नाही.

औरंगाबादला महापालिकेचे शिवाजी संग्रहालय 1997 च्या आसपास उभे राहिले, मात्र त्यात ठेवण्यासाठी वस्तूच नव्हत्या. शांतिलाल पुरवार यांनी स्वत:हून त्या संग्रहालयाला आकार देण्याची जबाबदारी स्वीकारली. त्यांनी त्यांच्याकडील तीन हजार वस्तू त्या संग्रहालयाला दिल्या. संग्रहालयाने पुरवार यांना मानद संचालक पद दिले. सध्या श्रीप्रकाश त्या पदावर आहेत.

श्रीप्रकाश पुरवार हे बिद्री कलावंत. सध्या ते पंचधातूच्या मूर्ती घडवण्याचे काम करतात. ते वडिलांच्या संग्रहाची निगा राखतात. त्यांना वडिलांनी जमा केलेल्या सर्व वस्तूंचा अभिमान वाटतो. त्यातून पुढील पिढ्यांना भारताच्या ऐतिहासिक वारशाची ओळख होईल अशी त्यांची भावना आहे. शांतिलाल पुरवार यांनी जमा केलेला तो वारसा लोकांपुढे यावा करता श्रीप्रकाश आणि त्यांचे दोन भाऊ, जयप्रकाश आणि ओमप्रकाश यांनी धडपड आरंभली आहे. त्या तिघांनी पैसे उभे करून त्या संग्रहाला ‘संग्रहालया’चे रूप देण्याचा प्रयत्न चालवला आहे. लवकरच ते संग्रहालय लोकांकरता खुले होईल.

श्रीप्रकाश पुरवार – 9423450096

(पूर्वप्रसिद्धी – दैनिक दिव्य मराठी, रसिक पुरवणी, फेब्रुवारी 2018)

– साईप्रसाद कुंभकर्ण

 https://mahanagarnews.com/human-sculpture-found-for-the-first-time-in-ahmednagar-district-is-evidence-of-the-existence-of-paleolithic-man/

mahanagarnews.com

नगर जिल्ह्यात प्रथमच सापडले मानवी शिल्प, अश्मयुगीन मानवाच्या अस्तित्वाचे सापडले पुरावे

By Mahanagar News

अहमदनगर- अश्मयुगीन मानव म्हटलं की नजरेसमोर येतं ते इयत्ता तिसरीच पुस्तक ‘ माणसाची गोष्ट’ हा मानव कसा होता ? काय खात होता? हे या पुस्तकातूनच आपण शिकलो. अशाच एका अश्मयुगीन ठिकाणाचा शोध नुकताच इतिहास अभ्यासक सतीश भिमराव सोनवणे यांनी लावला. हे ठिकाण कामरगाव जवळच्या ‘ मावलया डोंगरावर’ सापडले आहे.
कामरगाव नगर तालुक्यातील गाव. या गावाच्या भोवती सह्याद्रीची एक तुटक रांग आहे. यातील विठ्ठलवाडी कडून अस्तगावच्या दिशेने जाणाऱ्या रस्त्यावर नगर पुणे महामार्ग पासून साधारणतः३ किमी अंतरावर एका टेकडीला मावलयाचा डोंगर म्हणतात. या ठिकाणाला सोनवणे यांनी दि २५ फेब्रुवारी २०२४ रोजी भेट दिली होती . या डोंगरावर काही उभ्या शिळा ठेवलेल्या आहेत आणि एका बाजूला मध्ययुगीन काळातील कोणतीही मूर्ती नसलेले बांधकाम आहे. याचा बारकाईने अभ्यास केला असता ही वेगळीच रचना असल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यानुसार अभ्यास सुरू केला. इतिहास अभ्यासक प्रा. टी. मुरुगेश यांच्या मता नुसार हे इतिहास पूर्व कालीन थडगे असावे. ज्याचा संबंध मातृ देवतेशी असतो. त्यानुसार आणखी निरिक्षण करण्यासाठी दुसऱ्यांदा दिनांक १० मार्च २०२४ रोजी त्यांनी पुन्हा भेट दिली. यावेळी त्यांना काही पुरावे सापडले . त्यात सात उभ्या शिळा होत्या , यांची मावलया नावाने पूजा केली जात आहे. या शिळांचा आकार वेग वेगळा असून त्यावर स्थानिक लोकांनी शेंदूर लावला आहे.
सर्वात महत्त्वाचा पुरावा -मानवी प्रतिमा असलेली शिळा (कातळ शिल्प )- यातील एका शिळेवर एका चार पायांच्या प्राण्यावर बसलेल्या मानवाचे चित्र दगडावर कोरलेले आहे. चित्राची उंची साधारणतः २० सेमी आहे व रुंदी १५ सेमी. ज्या प्राण्यावर माणूस बसलेला आहे त्याची मान उंच आहे यावरून तो घोडा किंवा उंट असावा असा अंदाज आहे .
यातील माणूस वारली चित्रा प्रमाणे भासतो. डोके वर्तुळाकृती छाती आणि पोटांच्या जागी दोन त्रिकोण अशी रचना आहे.
कोकणातील काळ्या कातळावर कोरलेले हे शिल्प दख्खनच्या पठारावर नव्याने सापडत आहेत . या शिल्पातील व्यक्ती प्राण्यावर बसलेली आहे म्हणजे ते एका वीराचे शिल्प असले पाहिजे. या परिसरात सात अप्सरांचे अस्तित्व आहे असे स्थानिक सांगतात. याचा संबंध सप्तमातृकांशी येतो. यावरुन कदाचित ही वीरांगना सुद्धा असू शकते.
या परिसरात काही अश्मयुगीन दगडी हत्यारे सुध्दा सापडली आहेत. याबरोबरच अश्मयुगीन राखेची टेकडीही परिसरात सापडली आहे.
दख्खनच्या पठारावरील काळ्या कातळावरील शिल्पावर आंतरराष्ट्रीय दर्जाचे संशोधन करणारे सचिन पाटील यांच्या मता नुसार कठीण बेसाल्ट खडकावर असे शिल्प नव्याने सापडत आहेत. याशोधा साठी त्यांनी सतीश सोनवणे यांचे अभिनंदन केले आहे. राज्य पुरातत्त्व विभागाचे संचालक तेजस गर्गे यांना याबद्दल ई मेल द्वारे कळविण्यात आले आहे. या संदर्भात अधिक संशोधन करत असल्याचे सतीश सोनवणे यांनी सांगितले .या संशोधनास निवृत्त प्रा. एम
एन आंधळे , विक्रांत मंडपे , अर्जुन खाडे, प्रशांत साठे यांनी मोलाची मदत केली.

नगर तालुक्यातील कामरगाव येथील मावलया नावाच्या डोंगरावर पुरातन काळातील शिल्प व काही शिळा सापडल्या आहेत . इतिहास अभ्यासकांच्या मतानुसार या परिसरात नवाश्मयुगातील मानवाचे अस्तित्व होते . याचे सखोल संशोधन झाल्यास महत्त्वाची ऐतिहासीक माहिती व पुरावे मिळू शकतील . त्या दृष्टीने प्रयत्न सुरू आहेत . “— सतीश सोनवणे ( इतिहास अभ्यासक , कामरगाव )

” दख्खनच्या पठारावर काळया कातळावर शिल्प कोरलेले पुरावे नव्याने सापडत आहेत . नगर जिल्ह्यात मात्र प्रथमच असे शिल्प सापडले आहे . सापडलेल्या पुराव्याचे पुरातत्त्व विभागाच्या मार्फत संशोधन केले जाईल . यातुन काही ऐतिहासिक माहिती समोर येईल . ” — सचिन पाटील ( काळ्या कातळ्यावरील शिल्पाचे आतंरराष्ट्रीय अभ्यासक , पुणे

 https://www.discovermh.com/history-of-khandesh-1/

discovermh.com

खानदेशातील मानवी वसाहतीचा इतिहास | Discover Maharashtra

Discover Maharashtra

खानदेशातील मानवी वसाहतीचा इतिहास –

पुरातत्वेत्यांनी गिरणा आणि तापी नदीच्या परिसरात केलेल्या उत्खननामुळे या प्रदेशातील प्रागैतिहासिक काळातील भटक्या मानवाची वस्तुरूप संस्कृती काही प्रमाणात उजेडात आली. तापीच्या खोऱ्यात जवळपास पंधराशे एवढी मानवी वसतीचे पुरावे असलेली स्थळे डॉ.वसंत शिंदे आणि इतर तज्ञांनी शोधली आहे. या दोन्ही नद्यांच्या काठी मिळालेल्या प्राचीन अश्मयुगीन हत्यारांमुळे जळगाव परिसरात एक-दीड लाख वर्षांपूर्वी मानव वस्तीला राहत असावा. चांगदेवपासून अवघ्या तीन किलोमीटर आग्नेयेस असलेल्या मानेगावी आद्य पुराश्म युगातील म्हणजे काही अवशेष सापडले आहेत.(खानदेशातील मानवी वसाहतीचा इतिहास)

बी.पी.बोपर्डीकर यांनी उत्खनन केले आहे. “Early stone age site at Manegav of the Purna river, Jalgaon district Maharashtra, indian antiquity असा त्यांचा लेख इंडियन अंटीक्वेरी खंड 4 मध्ये 1970 मध्ये प्रसिद्ध झाला.

पाटणे या गावी चाळीसगाव तालुक्यातील, मध्यपुराश्म युगाच्या(middle paleolithic) म्हणजे शेवटच्या काळापासून उत्तर पुराश्म युगातील म्हणजे अप्पर पेलीओलेथिक आणि त्यापुढील मध्याश्मयुगातील म्हणजे मेझोलेथिक काळात मानवी वसाहतींचे यांचे पुरावे आढळले आहेत. पाटणे येथील उत्खननाचा रिपोर्ट बघितल्यास आपल्यास ही माहिती मिळते. पाटणे बद्दल सविस्तर वेगळा लेख लिहिन. यावरून खानदेशात इसवी सन पूर्व दिड लाख ते एक लाख वर्षे या कालावधीत मानवी वसाहत होती. गिरणेच्या काठी येथे बहाळ आणि टेकवडे येथे 1952 व

57 मध्ये केलेल्या उत्खननावरून ताम्रपाषाण युगात इसवी सन पूर्व २७०० ते इ.स. सहाशे येथे निश्चित मानवी वसतीचे पुरावे मिळाले आहेत.

लासन (Lassen) या इतिहासकारांच्या मते संस्कृत भाषा बोलणारे लोक दक्षिण गुजरातच्या समुद्र किनाऱ्यावरून तापीच्या खोऱ्यात शिरले व तेथून पुढे पूर्वेकडे गेले तशीच एक वसाहत करणाऱ्यांची लाट पूर्वेकडे आल्याचे काही उल्लेख आख्यायिका मध्ये आहेत. या आख्यायिका ग्राह्य धरल्या तर किंवा काही कणही ग्राह्य धरले तक्ष इसवी सन पूर्व सोळाशे शतकाच्या अगोदर खानदेशातील गडावर विविध राजपूत अधिपतींचे राज्य होते असे अनुमान करता येईल. नाशिकच्या सातवाहन लेणीतील सातवाहन काळातील लेणीतील शिलालेखात ऋषिक हा उल्लेख आहे या प्रदेशात सातवाहन काळात म्हणजे इसवी सन पूर्व 250 ते इ स 250 ऋषिक नावाचे हिमालयात वस्ती करून राहणारे लोक आले. त्यांचा स्वामी कृष्ण,#कान्हा, कण्ह असा बदल होऊन कानदेश आणि पुढे खानदेश असे नाव पडले असावे. येथील राजे अभीर म्हणजेच मध्ययुगातील आहेत, जरी ते नंतरच्या काळात उल्लेख सापडतो तरी सुरवातीच्या काळात वसती केली असावी.
आसिक हा ऋषिक नावाचा अपभ्रंश मानला तर प्राचीन खिंड आसिरगडला पुष्टी मिळते. त्याविषयी सविस्तर संशोधन लेख मी आशिरगड या पुस्तकात लिहिले आहे. ते अप्रकाशित आहे. ते व्यवसायांनी गवळी होते. म्हणजेच कृष्णाची नाते सांगणारे काही काळ खान्देशावर त्यांनी राज्य केले. नंतरच्या काळात चालुक्य बदामींचे ते मांडलिक दिसतात. तसेच अजिंठा लेणी येथील शिलालेखात उल्लेख असलेले वाकाटक राजांचे मांडलिक राजे अभिर असण्याची शक्यता दिसते. अजिंठा आणि खानदेश या संदर्भात सविस्तर लिहिले आहे. तर नाशिक लेणीतील शिलालेखात शिवपुत्र शिवदत्त याचा पुत्र ईश्वर सेन या राज्याची इसवी सन 419 मध्ये खानदेशावर सत्ता होती असे नाशिक लेणीतील एका शिलालेखातून दिसून येते.

प्राचीन काळ समजून घेण्यासाठी खानदेशात असलेल्या लेणी नाशिक अजिंठा यातील शिलालेखांचा आधार घ्यावा लागतो. स्थानिकांनुसार रामायणातील रामायणकालीन शरभंग ऋषीचा आश्रम उनपदेव चोपडा येथे तालुका चोपडा आणि वाल्मिकींचा आश्रम वालझरी चाळीसगाव येथे होता. तसेच खानदेशात फिरतांना अनेक ऋषिंच्या आश्रमांचा उल्लेख येतो. कानळदा कण्व, शिंगद येथे शृंग इत्यादि अजून उदाहरणे देता येतील. यांची कथा आणि दंतकथा सांगितल्या जातात.

ऋषींचे आश्रम तसेच अजिंठा परिसर गौतम ऋषींचा म्हणून ओळखला जातो, तर महाभारतात उल्लेखलेली एकचक्रा नगरी म्हणजे आत्ताचे एरंडोल असेही सांगतात. इसवी सन पूर्व 1000 ते इसवी सन पूर्व तीनशे या काळात विदर्भ खानदेशात आर्य लोक आले, असे काही तज्ज्ञांचे म्हणणे आहे. यात रेणुकामाता आणि तिच्या कथा प्रामुख्याने आहे. अनेक जण तिला कुलदेवता मानतात. दंतकथांवर विश्र्वास नसला तरी काही कण सापडतात एवढं मात्र नक्की.

खानदेशाविषयी पहिला विश्वसनीय संदर्भ टॉलेमी इसवीसन 150 चा लेखनात मिळतो. टॉलेमीने फिलीट आणि कोंडली किंवा गोंडली यांचे मुळस्थान नर्मदा नदीच्या दक्षिणेकडे असल्याचे नमूद केले आहे. ते फिलिट म्हणजे बहुतेक भिल असावेत. आजही खानदेशात बरेच भिल्ल आहेत. भारतात नंतर आलेल्या टोळ्यांनी नर्मदेकाठून भिल्लांना खानदेशात पिटाळले. त्यावेळी खानदेश हीच भिल्लांची मुख्य वसाहत झाली होती. गोंडली याचे गोंधळी या शब्दाशी जसे उच्चार साम्य आहे. तसेच गोंड्या शब्दाचीही आहे. गोंडू गवळी गोंड महार हे गोंडांचेच वंशज असावेत. त्यांची वस्ती चाळीसगाव भागात जास्त प्रमाणात आहे.

नाशिक लेण्यातील इसवीसन 419 च्या एका शिलालेखात नाशिक खान्देश भागांवर अहिरांची सत्ता होती. या काळी या भागात आहिर वंश स्थायिक झाला होता. आज अहिरांपैकी अहिर सोनार, अहिर सुतार, आहिर शिंपी इत्यादी पोटभेद जिल्ह्यात आढळतात. खान्देश शिवाय ते वायव्य सीमा प्रांत, बंगाल, मध्य प्रदेश, कच्छ व काठेवाडतही आहे. ते सिथियन वंशाचे असावेत व मध्य आशिया व पुढे सिंधू खोऱ्यातून भारतात आले असावेत. काहींच्या मते अभीर हे आर्य वंशाचे आहेत. मात्र त्यास विश्वसनीय पुरावा नाही. स्थानिक आख्यायिकेनुसार काठेवाड हे अहिरांचे मुख्य केंद्र होते व येथिल आहिरांचे यांचे बाराव्या व तेराव्या शतकात देवगिरीच्या यादवांची जवळचे राजकीय संबंध जोडले होते.

गुजरातेतील मुसलमान स्वाऱ्यांना कंटाळून अकराव्या शतकात लेवा पाटीदार व लेवा गुजर हे तापीच्या खोऱ्यात आले. अल्लाउद्दीन खिलजीच्या देवगिरी वरील स्वारीच्या वेळी म्हणजे इ.स.१२९६ मध्ये मुसलमान प्रथमच या भागात आले. देवगिरीच्या यादवांच्या काळात मराठे दक्षिणेकडून तेथे आले. फारुकी राजवंशाचा संस्थापक मलिक राजा तथा राजा अहमद हा दुसऱ्या खलिफाचा वंशज होता. त्याची राजवट थाळनेरला १३७० पासून सुरू झाली. याच काळात अरब लोक या भागात आले. आठव्या शतकातील राष्ट्रकुट राजांच्या सैन्यात बरेच अरब होते हे दिसते. याच काळात फरिश्ता या इतिहासकाराने नुसार याच काळात पहिल्या दुर्गादेवी दुष्काळात भिल्ल व कोळी वगळता बहुतेकांनी येथून स्थलांतर केले. फारुकींच्या काळात या भागाची भरभराट झाली व शेजारच्या राज्यातील बरेच हिंदू व मुसलमान या भागात येऊन स्थायिक झाले. मुगल काळात येथे भिल्ल व कुणबी यांची भरभराट झाली.

अहमदनगर आणि विजापूरच्या राजवटीचा अस्त झाल्यानंतर तेथे अराजक माजून दक्षिणेत अस्थिरता आली. खानदेशात त्या मानाने शांतता असल्याने बरेच लोक येथे येऊन राहिले. औरंगजेबाच्या कारकिर्दीत खानदेशातील काही हिंदूंनी स्वेच्छेने इस्लाम धर्म स्वीकारला तर अनेकांना बळजबरीने मुसलमान करण्यात आले. खानदेशावर मराठ्यांची सत्ता स्थापन झाल्यावर म्हणजे १७६०-१८१८ हिंदूंना पुन्हा स्थैर्य प्राप्त झाले.

इसवीसन अठराशे तीन मध्ये भयंकर दुष्काळामुळे भिल्ल व कोळी यांच्याशिवाय इतरांनी काही काळ परत स्थलांतर केले. दुष्काळामुळे इथले जनजीवन पार विस्कळीत झाले. स्थलांतरित आणि पैकी बरेच लोक परत आलेच नाहीत. या कालखंडात येथे स्थानिक सरदारांनी उत्तर भारतातील अरब, उत्तर भारतातील परदेशी ब्राह्मण व कर्नाटकातील नाईकडा या तीन जमातींच्या सेना आपल्या पदरी बाळगल्या होत्या.

ब्रिटिश राजवट आल्यावर अठराशे अठरा मध्ये नाईकडा सैन्य हे कर्नाटकात गेले तर अरबहे हैदराबाद कडे गेले, तर काही परदेशी ब्राम्हण मात्र तिथेच शेती व्यवसाय करून स्थायिक झाले. मात्र जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था प्रस्थापित झाल्यावर विदर्भ व गुजरातमध्ये गेलेले मूळचे लोक परत आले.

हैदराबादचा निजाम व शिंदे यांच्या राज्यातूनही बऱ्याच लोकांनी खानदेशात स्थलांतर केले. तरीही एकोणिसाव्या शतकात बरीच दशके येथे वस्ती विरळच होती. इसवीसन १८५२ मध्ये जिल्ह्याचा बराच भाग विरळ लोकवस्तीचा होता. त्यामुळे उपजीविकेची साधने कमी असलेल्या रत्नागिरी जिल्ह्यातून लोकांना आणण्याचे प्रयत्न झाले, परंतु एवढ्या दूर लोक यायला तयार नव्हते. उदार शेतसारा पद्धती व रेल्वे सुरू झाल्यावर नजीकच्या भागातून मोठ्या संख्येने लोक आले.इ.स.१७७४ मध्ये खान्देश मिल सुरू झाल्यावर पुणे सातारा भागातील बरेच मराठा मजूर जळगावला आले. तरीदेखील २८७२ मध्ये खान्देश इतर जिल्ह्याच्या मानाने विरळ वस्तीचा गणला जात होता.

ब्रिटिश राजवटीत आलेल्या स्थलांतरित लोकांमध्ये प्रामुख्याने मारवाडी, व्यापारीवर्ग, रंगारी व तेल कामगार वर्ग आणि मराठा व कुणबी व मजूर वर्ग येथे आला.

येथील बंजारी लोक समुद्रकिनाऱ्यापर्यंत बैलगाडीने मालाची वाहतूक करत. रेल्वे आल्यानंतर बंजारांना वाहतुकीच्या बाबतीत रेल्वे स्पर्धा करावी लागली. काहींना पारंपारिक व्यवसाय पूर्ण सोडावा लागला. तांडा नायकांची जवळ भांडवल असल्यामुळे ते व्यवसाय करू लागले व्यापार करू लागले आणि तांड्यातील बाकीचे लोक शेती व्यवसाय करू लागले. काहींनी लुटमारीचा मार्ग स्वीकारला. आता ह्या भागात झपाट्याने औद्योगिकीकरण होत असून इतर भागातील लोक येथे येत आहेत. तरीही प्राचीन व्यवस्था, प्राचीन इतिहास आणि व्यवस्था समजून घ्यायला आशिरगड तसेच अजिंठा याचा क्रमाक्रमाने अभ्यास करूया. या आधी या भागात झालेली उत्खनने आणि त्यांचा आढावा घेतल्यास बराच उलगडा होईल.खानदेशातील मानवी वसाहतीचा इतिहास.

संदर्भ:

१. महाराष्ट्र राज्य गॅझेटियर जळगाव जिल्हा: १९९४
२. हिस्टरी ऑफ मिडीएव्हल डेक्कन, एच.के.शेरवानी,पी.एम. जोशी
३.बी.पी.बोपर्डीकर, अर्ली स्टोन एज साईट ऑट मानेगाव ऑन दि पुर्णा रिव्हर जलगांव डिस्ट्रिक्ट महाराष्ट्र, इंडियन अन्टिक्वरी खंड ४.

Suresh Suryawansh

 https://thinkmaharashtra.com/paleolithic-cave-near-amravati/

thinkmaharashtra.com

अमरावतीजवळ अश्मयुगीन चित्रगुहा ! | थिंक महाराष्ट्र

See author's posts

अश्मयुगीन चित्रगुहा अमरावती जिल्ह्यामध्ये मोर्शी नजीक आढळून आल्या आहेत. हे ठिकाण सातपुड्याच्या पायथ्याशी येते. पुरातत्त्व संस्थांनी त्यांची दखल घेतली आहे. पण तरीही त्या दुर्लक्षित राहिल्या आहेत.

धारूळ हे मोर्शी तालुक्यातील आदिवासीबहुल गाव आहे. त्या गावाजवळ या अश्मयुगीन चित्रगुहा आहेत. चित्रगुहांचा शोध अमरावतीच्या सहा निसर्गप्रेमींना भटकंतीदरम्यान 2007 मध्ये लागला. महाराष्ट्र आणि मध्यप्रदेश यांच्या सीमेवरील इसवी सनपूर्व पस्तीस हजार वर्षांपूर्वीचे हे अश्मयुगीन मानवी वसतिस्थान आहे.

चमूने ‘रॉक आर्ट सोसायटी ऑफ इंडिया’ या संस्थेच्या आंतरराष्ट्रीय परिषदांमध्ये शोध कार्याचे सादरीकरण केले. चमूचे शोधलेख ‘पुराकला’ आणि ‘पुरातत्त्व’ जर्नलमध्ये प्रसिद्ध झाले आहेत.

भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षण विभागाच्या नागपूर येथील कार्यालयातील एक पथक काही वर्षांपूर्वी चित्रगुहा पर्यंत पोचले. भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षण विभागाच्या चमूने या चित्रगुहांचे निरीक्षण करून काही निष्कर्ष काढले आहेत.

गुहांचा शोध घेणाऱ्यांमध्ये डॉ. विजय इंगोले, प्र.सु. हिरूरकर, पद्माकर लाड, मनोहर खाडे, ज्ञानेश्वर दमाहे, शिरीषकुमार पाटील यांचा समावेश आहे. त्यांची ही शोधमोहीम 2018 पर्यंत सुरू होती. त्यांनी बरेच तपशील गोळा केले. त्यानुसार मध्यप्रदेशातील भीमबेटका हे आशिया खंडातील सर्वात जुने मानवी वसतिस्थान दहा हजार वर्षांपूर्वीचे असून त्यानंतर शोध लागलेले हे मानवी वसतिस्थान त्याहूनही जुने आहे असा संशोधकांचा दावा आहे. येथे तीनशेहून अधिक शैलगृहे आणि हजाराहून जास्त शैलचित्रे व कोरीव चित्रे आहेत. लोहयुगातील भैरव किंवा भूतनाथ; तसेच, काही युद्धचित्रांचाही तेथील संपदेत समावेश आहे. आदिमानवाने या भागात चौतीस हजार वर्षे वास्तव्य केले असावे असा संशोधकांचा अंदाज आहे.

मोर्शीच्या या चित्र गुहांना जागतिक नकाशात स्थान मिळालेही, पण त्याकरता जागतिक पातळीवरील संशोधन पत्रांचे सादरीकरण आणि पुरातत्त्व विभागाशी पत्रव्यवहार सतत करावा लागला. दरम्यान, त्यांना या अतिप्राचीन मानवी वसतिस्थानाला ‘अंबादेवी रॉक शेल्टर’ हे नाव मिळवून देण्यातही यश आले आहे.

या चित्रगुहा भीमबेटकाच्या आग्नेय दिशेला दीडशे किलोमीटर अंतरावर आहेत, तर अमरावतीपासून उत्तरेकडे सुमारे पंच्याऐंशी किलोमीटरवर आहेत. चित्रगुहांचा आकार तीस मीटर रुंद, दहा मीटर उंच आणि आतील भाग दहा मीटरपर्यंत आहे. या चित्रगुहांना ‘आर्ट गॅलरी’सारखे स्वरूप देण्यात आले आहे.

हा परिसर भीमबेटकापेक्षाही मोठा आहे. प्राण्यांची चित्रे गुहांमध्ये चितारण्यात आली आहेत. अमरावतीच्या चमूला सुरुवातीला अकरा गुहा गवसल्या. नंतरच्या काळात त्यांची संख्या शंभरपर्यंत पोचली आहे. या चित्र गुहांमध्ये हत्ती, एकशिंगी गेंडा, सांबर, चितळ, रानडुक्कर, रानगवा, रानकुत्रा, वाघ, बिबट्या या प्राण्यांसह जिराफ यासारख्या प्राण्यांची चित्रे काढलेली आढळून येतात. आदिमानवांनी निवाऱ्यासाठी या गुहांचा वापर करताना ही चित्रे रेखाटली आहेत. अनेक प्राण्यांच्या अस्तित्वाच्या खुणा या चित्रांच्या माध्यमातून जपल्या गेल्या आहेत. शिवाय, या गुहा मानवी समूहांच्या स्थलांतराच्या इतिहास संशोधनात मोलाच्या ठरू शकतात. हे दालन पुरातत्त्व विषयाची आवड असणाऱ्या लोकांपर्यंत पोचवणे आवश्यक असताना पुरातत्त्व विभागाने केवळ संशोधनाचे श्रेय घेतले अशी टीका त्या विभागावर झाली. पुरातत्त्व खात्याच्या प्रागैतिहासिक विभागाने स्वत: अन्वेषण करून या गुहा शोधल्याचा दावा केल्यावर तर या गुहा शोधून काढणारे निसर्गप्रेमी अवाक झाले !

तज्ज्ञांनी या परिसरामध्ये कुकडसा देव येथे नऊ, गायमुख परिसरात दोन चित्रित गुहा, कोसुंभ येथे दोन गुहा, अंबादेवी परिसरात दोन प्राण्यांच्या चित्रांव्यतिरिक्त या ठिकाणी लहान मुलाचे व आईचे चित्रसुद्धा सापडले आहे. ते चित्र त्या काळातील कुटुंब संस्थेशी निगडित आहे. त्यांना अभ्यास करताना पुराणकालीन, पाषाण युगातील दगडी अवजारे सापडली आहेत. त्यामध्ये छिद्र करण्याचे हत्यार, टोचण पाती, खुरचण असे नमुने आहेत. ही अवजारे तुटक्या अवस्थेत असून अवजारांचे अवशेष आहेत. त्या युगातील मानवांनी याच अवजारांचा वापर गुहा खोदून त्या पूर्णपणे तयार करण्यासाठी केला असावा असा निष्कर्ष काढण्यात आला.

ही शैलचित्रे पाहण्यासाठी भारतातील अनेक शास्त्रज्ञ आणि इतर लोक येत आहेत. त्या ठिकाणी जाण्यासाठी मार्ग अमरावती जिल्ह्यातून आहे. तो परिसर पाहण्यासाठी तीन ते चार दिवस लागतात, मात्र त्या ठिकाणी निवासाची सोय नाही. संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठात पुरातत्त्व हा विषय समाविष्ट करण्यास हवा, जेणेकरून या भागात अधिक संशोधन होऊ शकेल.

विजय इंगोले, संशोधक, अमरावती. 9049844964 vtingale@gmail.com

– मोहन अटाळकर 9422157478 mohan.atalkar@gmail.com

 https://laxmankatekar.wordpress.com/2020/07/07/%E0%A4%85%E0%A4%B6%E0%A5%8D%E0%A4%AE%E0%A4%AF%E0%A5%81%E0%A4%97/

laxmankatekar.wordpress.com

अश्मयुग


अश्मयुग :

मानवी इतिहासातील अतिप्राचीन कालखंड. हा सु. पाच लाख ते दहा हजार वर्षापूर्वीपर्यंत साधारणत: मानण्यात येतो. सर्वसाधारणपणे माणसाला लेखनकला अवगत होण्यापूर्वीच्या इतिहासास प्रागितिहास म्हणतात. प्रागैतिहासिक काळापैकी एका सांस्कृतिक अवस्थेस, म्हणजे जेव्हा प्रामुख्याने दगडाचाच उपयोग हत्यारांसाठी केला जात होता त्या काळास ‘अश्मयुग’ असे म्हटले जाते. यात मानवास कोणताही धातू व धातूचा जाणीवपूर्वक उपयोग माहीत नव्हता. प्रागितिहासाचा जवळजवळ चारपंचमांश भाग अश्मयुगानेच व्यापला आहे. अश्मयुगातील मानव त्याच्या भोवती असणाऱ्या लाकडे, हाडे, दगड इत्यादींचा उपकरणे व हत्यारे बनविण्यासाठी उपयोग करीत होता. त्यांपैकी लाकूड व हाडे सहज नाश पावणारी असल्याने या पदार्थांची आयुधे वा उपकरणे मानवी वस्त्यांच्या अवशेषांत सहसा आढळत नाहीत. मात्र दगड टिकाऊ असल्याने त्याची उपकरणे व आयुधे पुष्कळ सापडतात. यावरूनच या कालखंडास ‘अश्मयुग’ असे नाव देण्यात येते.

अश्मयुगातील माणूस सर्वत्र एकाच प्रकारची आयुधे वापरीत होता किंवा एकाच पद्धतीचे जीवन व्यतीत करीत होता असे समजणे चुकीचे ठरेल. स्थलकालपरत्वे वेग व दिशा भिन्न असल्या तरी त्याच्या जीवनात प्रगती निश्चितच होती. ही मानवी प्रगती दर्शविण्यासाठी अश्मयुगाचे पुराणाश्मयुग, मध्याश्मयुग किंवा आंतराश्मयुग आणि नवाश्मयुग असे तीन मुख्य टप्पे कल्पिण्यात आले आहेत. त्यांतही पुराणाश्मयुगाचे पूर्व- पुराणाश्मयुग, मध्यपुराणाश्मयुग आणि उत्तरपुराणाश्मयुग असे पुन्हा तीन उपविभाग पाडले आहेत. या सर्व संज्ञा मुख्यतः यूरोपातील संशोधनांतून उत्पन्न झाल्या. इतर खंडांत प्रागैतिहासिक संशोधनाचा विकास सुरू झाल्यावर असे दिसू लागले, की तेथील प्रगतीची स्तबके काहीशी भिन्न असून वरील संज्ञा त्यांना चपखलपणे लागू पडत नाहीत. नवाश्मयुगापूर्वी पूर्व, मध्य व उत्तर अशी तीनच अश्मयुगे कल्पावी असे आफ्रिका, अमेरिका व भारत येथील काही पुरातत्त्वज्ञ समजत. परंतु स्थलविशेषामुळे उत्पन्न झालेल्या पारिभाषिक संज्ञांचा आशय अद्यापही निश्चित झालेला नाही. म्हणून सर्वत्र यूरोपीय संज्ञाच वापरण्यात आल्या आहेत.

अश्मयुगाच्या उपर्युक्त विभागांची सांस्कृतिक वैशिष्ट्ये स्थूलमानाने पुढीलप्रमाणे होत. यांच्या कालमर्यादांत स्थलभेदानुसार फरक आहेत.

अश्मयुगीन कालखंड

पूर्वपुराणाश्मयुग : याचा काळ सामान्यपणे पाच लाख ते दीड लाख वर्षांपूर्वीपर्यंतचा समजण्यात येतो. काही भूप्रदेशांत दहा हजार वर्षांपूर्वीपर्यंत हीच सांस्कृतिक अवस्था चालू होती. या काळात ग्युंझचा (पहिल्या हिमयुगाचा) आरंभ, येथपासून ते रिसच्या (तिसऱ्या हिमयुगाच्या) पहिल्या चरणापर्यंतचा भूस्तरीय काळ समाविष्ट होतो. अत्यंत कडाक्याची थंडी आणि तीव्र उष्णता असे विषम हवामान आणि तेही वारंवार बदलणारे, त्यामुळे पृथ्वीवरील वनस्पतिजीवनात मोठे फेरफार होत गेले. वृक्षराजी, दाट जंगले व गवताळ प्रदेश यांचे पट्टे उत्तर-दक्षिण असे सरकत राहिले. त्यामुळे जीवसृष्टीही बदलत गेली. आता नष्ट झालेले, सरळ दातांचे भीमगज व तत्सम इतर प्राणी, तसेच पाणघोडे, गेंडे, अस्वले, गवे, सांबरे, घोडे, हरणे असे कितीतरी प्राणी मानवाच्या अवतीभोवती वावरत होते. या प्राण्यांची शिकार हेच प्रमुख उपजीविकेचे साधन होते. वंशशास्त्रदृष्ट्या ज्याचा उल्लेख करता येणार नाही, पण तत्सदृश असे ऑस्ट्रेलोपिथेकस (Australopithecus), पिथेकॅन्थ्रापस (Pithecanthropus) व निअँडरथल (Neanderthal) हे मानवसदृश प्राणी पृथ्वीवर वावरत होते. पण त्यांचा वावर भूपृष्ठाच्या एकपंचमांश क्षेत्रापुरताच मर्यादित होता. अमेरिका व ऑस्ट्रेलिया या खंडांत जवळजवळ वस्ती नव्हतीच. सांस्कृतिक दृष्ट्या या माणसांचे पाच गट पाडण्यात येतात. ते असे : व्हिलाफ्रांकिअन (Villafranchian)–पहिल्या हिमयुगाच्या पहिल्या चरणात अबेव्हिलिअन (Abbevillian)–पहिल्या आंतरहिमयुगाच्या पहिल्या चरणात क्लॅक्टोनियन (Clactonian)–पहिल्या आंतरहिमयुगाच्या दुसऱ्या व तिसऱ्या चरणांत अश्यूलियन (Acheulian)–दुसऱ्या आंतरहिमयुगाच्या प्रथमार्धात व लेव्हालेइशियन (Levalloisian)–दुसऱ्या आंतरहिमयुगाच्या उत्तरार्धापासून पुढे. तंत्रविशेषां- वरून समजांचे वरील गट पाडण्यात आले आहेत. त्यामध्ये वांशिक भेद अभिप्रेत नाहीत. पूर्वपुराणाश्मयुगातील दगडी आयुधांत प्रामुख्याने तीन तंत्रे वा तंत्रप्रकार दिसतात. पहिला हातकुऱ्हाडीचा असून त्यात गोट्याच्या दोन्ही बाजूंचे टवके उडवून हत्यारे करण्यात येत. यांत बदामी आकाराचे टोकदार हत्यार हे प्रमुख होते. यावरूनच त्यास हातकुऱ्हाडतंत्र हे नाव पडले. दुसरा प्रकार म्हणजे कोयत्यासारखे किंवा खाटकाच्या सुऱ्या- सारखे तुकडे तोडणारे दगड व तत्सम हत्यारे निर्माण करण्याचे तंत्र होय आणि तिसरा प्रकार दगडी छिलक्यांपासून वरील दोन्ही प्रकारची उपकरणे तयार करणे हा होता. पहिल्या प्रकारचे तंत्र यूरोप, आफ्रिका, पश्चिम आशिया येथे, तर दुसरे तंत्र चीन व आग्नेय आशिया यांत आढळते आणि तिसरे तंत्र प्रथम पॅलेस्टाइन व पुढे वायव्य भारतात दिसते. कालांतराने ते इतरत्रही पसरले.

मध्यपुराणाश्मयुग: यात पन्नास हजार ते पंचवीस हजार वर्षांपूर्वीचा सर्वसाधारण काळ येतो. तिसऱ्या आंतरहिमयुगाचा उत्तरार्ध आणि व्यूर्मची ( Wurm–चौथ्या हिमयुगाची ) सुरुवात, हे काळ ह्यात समाविष्ट होतात. ह्या काळातील हवामान अतिशीत असल्यामुळे क्वचित अधूनमधून जंगले आढळत. मात्र ह्या काळात उत्तर यूरोपात खुरट्या वनस्पतींचा प्रदेश होता. त्यात गुहांच्या आश्रयाने राहणारे केसाळ गवे, अस्वले, रान- बैल व गेंडे हे मुख्य प्राणी असत. या काळात यूरोप व पश्चिम आशिया या भागांत निअँडरथल मानवाची वस्ती होती. तो मुख्यत्वे गुहांतून वा प्रस्तरालयांतून राहत असे. त्यांतील काही गुहांतून चित्रकाम सापडले आहे. मौस्टेरियन (यूरोप) व लीव्हाल्लॉइसो-मौस्टेरियन (पश्चिम आशिया) हे ह्या काळातील दोन प्रमुख समाजगट होत. त्यांची हत्यारे लहान आकाराची, वाटोळी पण धारदार आणि वैशिष्ट्यपूर्ण होती. ती गोरगोटी दगडांच्या छिलक्यांची केलेली असत. ह्याशिवाय इतर उपकरणांत तासण्या, टोचे, बाणांच्या टोकासारखे लहान हत्यार यांचाही समावेश असे.

उत्तरपुराणाश्मयुग : हा काळ सर्वसाधारणपणे पंचवीस हजार ते दहा वर्षांपूर्वीपर्यंतचा समजण्यात येतो. या काळाचा आरंभ चाळीस हजार वर्षांपूर्वी झाला असावा, असेही एक मत प्रसृत आहे. यूरोपपुरता हा काळ निश्चित असून, चौथ्या हिमयुगात जी तीन हिमप्रसरणे झाली त्यांतील पहिल्या व दुसऱ्या प्रसरणांच्या मधल्या काळात मध्य यूरोप वा दक्षिण रशिया येथे याचा उदय झाला. ह्या काळातील हवा थंड असल्याने या भागातही खुरट्या वनस्पती आढळत. रेनडिअरसारख्या प्राण्यांचे कळप त्यामुळे सर्वत्र वावरत होते. तसेच भीमगजा- सारखे काही काही प्राणी दक्षिण यूरोपात होते. वंशशास्त्रज्ञ ज्याला ‘होमो सॅपियन’ असे नाव देतात त्याच्या क्रोमॅग्नन व कोम्ब कापेल ब्रून मानव ह्या दोन शाखा यूरोपात सर्वत्र पसरल्या होत्या. होमो सॅपियनला पूर्णार्थाने मानव समजण्यात येते. पश्चिम आशियातही ही संस्कृती दिसून येते. इतर खंडांतील या संस्कृतीचे अस्तित्व व स्वरूप याबाबत तज्ञांत एकमत नाही. पेरीगोर्डियन किंवा ऑरिग्नेशियन, सॉल्यूट्रीअन, मग्डलेनिअन हे मुख्य समाजगट त्या वेळी अस्तित्वात होते. नैसर्गिक गुहांचा निवासासाठी मोठ्या प्रमाणावर वापर केला जाई. त्यांत काही ठिकाणी चित्रकाम आढळले आहे. पारलौकिक जीवन आणि अतिमानुषी शक्ती यांसंबंधी येथे विचार असावा इतका पुरावा मृतात्म्यासंबंधीची थडगी व विधी ह्यांमधून ज्ञात होतो. गारगोटीच्या दगडाची पातळ व सरळ पाती असलेली संयुक्त आयुधे बनविण्यात येऊ लागली. पानाच्या आकाराची बाणाची टोके, तासण्या, टोचे (Awl-Burin) ही विशिष्ट आयुधेही ह्या काळात वापरात होती. लाकूड व शिंगे यांचाही हत्यारांच्या निर्मितीसाठी वाढता उपयोग करण्यात येऊ लागला होता.

आंतराश्मयुग : ह्याचा पंधरा हजार वर्षांपूर्वी आरंभ होऊन दहा हजार वर्षांपूर्वी त्याचे पूर्ण प्रगल्भावस्थेत रूपांतर झाले. तथापि त्याचे अस्तित्व अत्यंत मर्यादित होते. चौथ्या हिमयुगाच्या तिसऱ्या प्रसरणाच्या काळात ह्यास सुरुवात झाली. थंड हवेऐवजी पर्जन्यमानात हळूहळू वृद्धी होऊ लागली व त्यामुळे गवताळ जंगलांची वाढ झाली आणि जीवसृष्टी सध्यासारखी निर्माण झाली. क्रोमॅग्‍नन मानवाच्या वंशाचा सर्वत्र प्रसार झाला. त्याविषयीचा पुरावा यूरोप व पश्चिम आशिया या भागांत प्रामुख्याने आढळतो. इतर खंडांतील या विशिष्ट सांस्कृतिक स्तबकाचे स्वरूप व विस्तार यांविषयी फारशी माहिती ज्ञात नाही. अझिलियन, टार्डेनोइशिअन, ॲस्टुरियन, एर्टेबोल, पॅलेस्टाइन (यूरोप) नाटुफियन (उत्तर ईजिप्त) हे प्रमुख समाजगट येथे होत. मुख्यत: हे उघड्यावर वा तळ्यांच्या काठी कातडी तंबूंतून निवास करीत. मात्र त्यांपैकी काही गुहांतही राहत असावेत. काही भागांत जमिनीत बोगद्यासारखे खड्डे करून त्यांचा त्यांनी राहण्यासाठी उपयोग केला होता. ‘सूक्ष्मपाषण’ नावाने ओळखली जाणारी गारगोटीच्या दगडाची त्रिकोण, चंद्रकोर इ. विविध आकारांची पाती वापरून ते संयुक्त हत्यारे बनवीत. मांस व आपोआप उगवणाऱ्या धान्याचेही ते भक्षण करीत. ह्या काळात प्राणी माणसाळविण्यास आरंभ झाला असावा.

नवाश्मयुग : ह्या काळास इ.स.पू. आठ हजारांच्या पुढे आरंभ झाला. इ.स.पू. पाच हजारांच्या आसपास त्याची विशेष प्रगती झाली. त्या वेळी हवामान, प्राणी व वनस्पतिसृष्टी सध्यासारखीच होती. मानववंशही बहुधा आज असणारेच होते. बारीक दगडी पात्यांची उपकरणे, घासून गुळगुळीत व धारदार केलेल्या दगडी कुऱ्हाडी, छिन्न्या यांची निर्मिती व वापर ह्या काळात होऊ लागला. चीन व आग्नेय आशिया या भागांतील हत्यारांचे आकार भिन्न आहेत. या भागातील नवाश्मयुगीन संस्कृतीही अनेक दृष्ट्या पश्चिमेकडील तत्कालीन संस्कृतीपेक्षा भिन्न आहे. या वेळी गाय, बैल, डुक्कर, मेंढी व शेवटी शेवटी घोडा हे प्राणी माणसाळले होते. पशुपालन हा महत्त्वाचा व्यवसाय सुरू झाला होता. याबरोबरच धान्य पिकविण्याची विद्या मानवाला साध्य झाली असावी. या व्यवसायाचा आरंभ पॅलेस्टाइनमध्ये झाला असावा. कारण आतापर्यंत हाती आलेले याबाबतचे सर्वांत प्राचीन नवाश्मयुगीन अवशेष या भागातीलच आहेत. मानवास शेतीसाठी बराच काळपर्यंत एकाच ठिकाणी राहण्याची जरूर भासू लागली आणि त्यामुळे उपजीविकेला एक प्रकारची शाश्वती आली. म्हणून स्थिर स्वरूपाच्या वसाहतींना प्रारंभ होऊन पहिली खेडी निर्माण झाली. गवत, लाकूड, कच्च्या विटा, दगड यांनी ही घरे बांधलेली असत. काही भागांत (पूर्व आशिया) भूमिगत घरांचाही वापर होता. शेकडो वर्षांच्या वाटचालीतून ह्या स्थिरपद जीवनाचा लाभ झाला. त्या पायावरच नागरी संस्कृतीची कालांतराने उभारणी झाली. धातूंचा शोध लागल्यावर वरील प्रक्रियेला गती मिळाली आणि अश्मयुगाचा अस्तही होऊ लागला. अश्मयुगाचा अस्त प्रथम इ.स.पू. ३०००च्या सुमारास मेसोपोटेमिया व ईजिप्त या ठिकाणी झाला.

मानवी जीवन

अन्न : मानवी जीविताच्या आद्य निकडींपैकी पहिली अन्न होय. अश्मयुगापैकी पहिल्या दोन खंडांतील मानवाचे मुख्य अन्न म्हणजे त्याच्या भोवताली वावरणारे प्राणी, थोड्याफार प्रमाणात फळेमुळे-वनस्पती. आपले भक्ष्य मिळविण्यासाठी मानवाला त्याच्या शरीरशक्तीपेक्षा बुद्धिबलाचा अधिक वापर करणे भाग होते. कारण भोवतालचे बहुतेक सर्व प्राणी त्याच्यापेक्षा ताकदवान, चपळ होते किंवा त्यांना निसर्गाकडून मिळालेली स्वरक्षणाची साधने मानवाला दूर ठेवण्यास पुरेशी होती. अशा स्थितीत माणसाने टाकलेले पहिले पाऊल म्हणजे गटागटाने शिकार करणे हे होय. अश्मयुगीन मानव ताकदीत भारी असणारा प्राणी कोंडीत पकडून त्यास दगड-धोंड्यांनी ठेचून मारी. पूर्वपुराणाश्मयुगात प्रचंड गवे व गेंडे अशा प्राण्यांना खड्ड्यात फसवून मारण्याची विद्या मानवाने हस्तगत केली होती. असे खड्डे व त्यांत फसलेल्या प्राण्यांची हाडे यूरोपात मिळाली आहेत. मात्र अग्नीचे ज्ञान झाल्यावर गुहांत विसावणाऱ्या श्वापदांना हुसकून बाहेर काढण्यासाठी त्याचा उपयोग केला जात असे. उत्तरपुराणाश्मयुगात रेनडिअर, सांबर, घोडे अशा वेगवान प्राण्यांचे कळप घेरून उंच अशा कड्याकडे वळविण्यात येत. भेदरलेली ही जनावरे धावण्याच्या वेगात कड्यावरून खाली पडत व तेथे थांबलेल्या शिकाऱ्यांच्या हातात ती अलगद सापडत. सांघिक शक्तीचे हे वेगवेगळे प्रयोग अन्नप्राप्तीच्या कामात माणसाला उपयुक्त ठरले. तद्वतच त्याची स्वत:ची संहारशक्ती नवनव्या आयुधांमुळे वाढत गेली. भाले, बोला, धनुष्यबाण इ. शस्त्रांमुळे स्वत: सुरक्षित राहूनही त्यास जास्त परिणामकारकपणे शिकार मिळवणे शक्य झाले. मच्छीमारीसाठी लहान होडगी आणि बांबूची प्रचंड टोपली यांचा उपयोग मानव आंतराश्मयुगात यूरोपमध्ये करीत होता. हाडांचे गळ, काटेरी बाण यांचाही उपयोग मासे व इतर जलचर प्राणी मारण्यास करण्यात येई.

आंतराश्मयुग व नवाश्मयुग यांच्या संधिकाळात मेंढ्या, गाई व इतर काही प्राणी माणसाळवून पाळण्याची विद्या मानवाने साधली. अशा प्राण्यांचे कळप बाळगण्यात येत व त्यांचा उपयोग प्रामुख्याने भक्षणासाठीच होत असे. पाळण्यात आलेले हे प्राणी तृणभक्षकच होते. त्यामुळे त्यांचे कळप घेऊन चराऊ कुरणांच्या शोधासाठी दूरदूर अंतरावर फिरणे त्यास आवश्यक झाले किंवा वर्षभर चारा असेल अशा ठिकाणी त्यास स्थायिक व्हावे लागले. पशुपालनाची ही अवस्था अगदी प्राथमिक असली, तरी तिची मुख्य फलनिष्पत्ती अन्नाची शाश्वती हीच होय.

याच्याच आसपास केव्हा तरी शेतीचा शोध लागला असावा. आरंभी मुद्दाम पेरण्यात आलेले धान्य म्हणजे गहू असावे. रानटी गव्हाच्या लोंब्या जमिनीवर पडतात, तेथे पुन्हा रोपे उगवतात, तेथेच नवा गहू येतो, हे जीवितचक्र माणसाच्या ध्यानात आले असावे. फळे, कंदमुळे गोळा करण्याचे काम मुख्यत: स्त्रियांकडे आले व हे निसर्गाचे चक्र प्रथम त्यांच्यात लक्षात आले असावे. कदाचित स्त्रियांनीच धान्य पेरण्यास आरंभ केला असावा. हा शेतीचा म्हणजे पर्यायाने नवाश्मयुगाचा आरंभ होय.

शिकार, मच्छीमारी, पशुपालन व नंतर शेती हे अश्मयुगीन माणसाचे क्रमश: मुख्य व्यवसाय होते. पुराणाश्मयुगात व आंतराश्मयुगात मात्र फक्त पहिले दोनच व्यवसाय होते. नवाश्मयुगात पशुपालन व शेती हे प्रधान व्यवसाय झाले, तरीही थोड्याफार प्रमाणात शिकार व मच्छीमारी होतच राहिली. त्याच्या जीविताच्या इतर शाखांचे स्वरूप बऱ्याच अंशी त्याच्या व्यवसायांवरून निश्चित झालेले दिसते.

अश्मयुगाच्या विविध अवस्थांत मानवी अन्नाचे रूपही पालटत गेले. पुराणाश्मयुगीन व आंतराश्मयुगीन माणसाच्या अन्नात सर्व प्रकारच्या लहानमोठ्या प्राण्यांचा आणि फळे व कंदमुळे यांचा समावेश होता. मोसमात व विशिष्ट प्रदेशात सापडणारे सर्व प्रकारचे लहान-मोठे प्राणी खाद्य होते इतकेच काय, फार जरूर वाटल्यास नरमांसभक्षणही होत असे. एरवी हरणे, डुकरे, हत्ती, भीमगज, अस्वले, घोडे हे प्राणी नित्याचे भक्ष्य होते. आंतराश्मयुगात याशिवाय मासे व इतर जलचर यांचा अन्नात समावेश झाला. या युगाच्या शेवटी शेळ्या-मेंढ्या, गायी-बैल यांसारख्या पाळीव जनावरांचे मांस हा आहाराचा एक भाग झाला. नवाश्मयुगात धान्या- बरोबरच मांसाहारही चालूच राहिला.

शेती करण्यास आरंभ झाल्यावर गहू, बार्ली, मका, ज्वारी, बाजरी, राय ही धान्य व वाटाणा, घेवडा, मूग, हरभरा व मसूर यांसारखी द्विदल धान्ये स्थलकालपरत्वे पिकविण्यात येऊ लागली. तेल मिळविण्या- साठी ऑलिव्हसारख्या फळांचा वापर आग्नेय स्पेनमधे होत असे. नासपती, सफरचंद, बोरे अशांसारखी फळेही या माणसाला उपलब्ध होती. पण त्यांची मुद्दाम लागवड केलेली नसे. पाळीव जनावरांत शेळ्या, गाई व डुकरे ही मुख्य असत. यांच्या मांसाचा खाण्यासाठी उपयोग होई. लामा, उंट, घोडा ही इतर पाळीव जनावरे वेळप्रसंगी भक्षणासाठी उपयोगी पडली, तरी मुख्यत्वे त्यांचा उपयोग वाहतुकीसाठीच होत असे.

समाजरचना : अश्मयुगीन समाजरचनेविषयी उत्खननातून मिळणारा पुरावा अप्रत्यक्ष व अल्प आहे. मिळालेल्या अवशेषांवरूनच काही अनुमाने बांधावी लागतात. या अनुमानांना बळकटी आणण्यासाठी, आजच्या मानवसदृश प्राण्यांची वागणूक (गोरिला, चिंपांझी इ.) आणि आजही अत्यंत मागासलेल्या, रानटी परिस्थितीत राहणाऱ्या जमातींविषयीची माहिती यांचा उपयोग करून घ्यावा लागतो. हे सगळे करूनही अश्मयुगीन समाजव्यवस्थेसंबंधी अत्यंत त्रुटित अशीच माहिती उपलब्ध होते.

आधीच हे स्पष्ट करावयास पाहिजे, की वैचारिक देवघेवीचे मुख्य साधन जी भाषा, ती त्या कालखंडात केव्हा व कोणाकोणाला प्राप्त झाली होती, याविषयी काहीही निश्चित सांगता येत नाही. परंतु पूर्वविचार व योजना, तसेच पुरस्सर सामूहिक जीवन प्रचलित होते. त्यावरून असे काहीतरी माध्यम अस्तित्वात असावे हे नक्की. शिकार करणे हे एकट्या-दुकट्याचे काम नसून त्यासाठी सांघिक प्रयत्न जरूर होते. तेव्हा पहिल्या- पासूनच मानवाला गटात किंवा टोळीत राहावे लागले आहे. या गटास कोठल्या माणसांचा समावेश होत असावा व या गटाची रचना कशी असावी, हे प्रश्न विवाद्य आहेत. केवळ मूळ उद्देशाकडे लक्ष ठेवून विचार केला, तर कोणाही धडधाकट माणसाचा त्यात समावेश व्हावा व सगळ्यांत अनुभवी शिकाऱ्याच्या हुकमात सगळ्यांनी चालावे, ही सरळ उत्तरे आहेत. पण मानवी जीवनातील कोणताच प्रश्न इतका सरळ सुटत नाही. केवळ एखाद्या मोठ्या शिकारीला वा शिकारीच्या एखाद्या मोसमात माणसे एकत्र येण्याऐवजी काही शाश्वत असे ऐक्य आरंभापासून अधिक प्रचलित असावे व हे ऐक्य सामाजिक बंधासारखे असावे. रक्ताचे नाते असणारी माणसे एकेका गटात असावी आणि हा कौटुंबिक गट असावा. पण या वेळी ‘कुटुंब’ याचा नेमका काय अर्थ असावा, याचा उलगडा होत नाही. यात एकाच पित्याची प्रजा होती, की एकाच मातेची प्रजा होती? अश्म- युगीन स्त्रीमूर्ती व चित्रे यांवरून काही तज्ञ असा निष्कर्ष काढतात, की येथे मातृसावर्ण्य होते. अपत्यप्राप्तीतील मातेच्या कार्याची साक्षात कल्पना या समाजाला होती. परंतु इतर अनेक मागासलेल्या समाजांप्रमाणे, प्रजोत्पादनातील पुरुषाचा नेमका वाटा कोणता? याची कल्पना अश्मयुगीन समाजाला नसावी. म्हणून मातेला, म्हणजे स्त्रीला, अधिक महत्त्व असावे. या प्रश्नाची दुसरी बाजू अशी, की या समाजातील स्त्रीपुरुष- संबंधाविषयीही कसलीच माहिती उपलब्ध नाही. कदाचित आजही जे प्राणिसृष्टीत दिसते, त्याप्रमाणे त्या वेळी एक बलिष्ठ पुरुष असावा. त्याच्या चारपाच स्त्रिया व बाल्यावस्थेतील अपत्ये एवढ्यांचा कुटुंबात समावेश असणे स्वाभाविक होतो. नव्याने वयात येणाऱ्या स्त्रीपुरुषांना–विशेषत: पुरुषांना –या व्यवस्थेत सामावून घेणे हा नेहमीचा प्रश्न राहणार. मग हे तरुण, आपल्या अथवा शेजारच्या कुटुंबातील स्त्रियांना वश करून घेऊन, स्वतंत्र कुटुंबे स्थापतील. म्हणजे पितृ-किंवा मातृ-सावर्ण्य यांपैकी कोणतीही पद्धत प्रचलित असू शकेल. अशी कुटुंबे एकत्र येऊन त्यांचा पुढे गट निर्माण होत असे. व्यावहारिक गरज व स्त्रीपुरुषसंबंध या दोन्हींची अशी सांगड घातली जात असणे सुसंगत व संभाव्य ठरते. या एकेका गटाचे सर्व घटक तेथे असतीलच असे म्हणवत नाही. तथापि एखाद्या विशिष्ट प्रदेशात राहणारी काही कुटुंबे व्यावहारिक सोयींसाठी एकत्र गट करीत असतील. या गटाचे निष्ठास्थान रक्तसंबंध नसल्याने काही दृश्य चिन्ह असणे उपकारक ठरेल, म्हणून एखाद्या प्राण्याचा किंवा पक्ष्याचा, निशाणी वा गणचिन्ह म्हणून उपयोग होऊ लागला. गुहांच्या भिंतींवर अस्वले, गेंडे अशा प्राण्यांची जी चित्रे दिसतात ती गणचिन्हेच समजता येतील. अशा गटात तीसपासून साठापर्यंत माणसे असावीत. ही सगळी एकत्र राहत, तसेच त्यांचे खाणेपिणेही एकत्रच होत असे. शिकारीसाठी म्हणून एखादा विशिष्ट भूप्रदेश एकेका गटाने राखून ठेवलेला असण्याची शक्यता असावी.

गटातील माणसे कोणती कामे करीत होती, याचे अगदी स्थूलमानाने विवेचन करता येईल. शिकार हा प्रमुख व्यवसाय पुरुषमंडळी करीत, तर फळे, मुळे, कंद हे गोळा करण्याचे काम स्त्रिया व मुले यांजकडे असे. मांस भाजून खाण्यास आरंभ झाल्यावर तेही स्त्रियांचेचे काम झाले असावे. स्त्रीचे सगळ्यात महत्त्वाचे कार्य बालसंगोपन हे होय. मानवी अपत्य दोनतीन वर्ष पूर्णपणे परावलंबी असते हे ध्यानात घेतले म्हणजे बाल- संगोपनात स्त्रीला लागणाऱ्या वेळाची व श्रमाची सार्थ कल्पना येईल. दगडी हत्यारे व उपकरणे तयार करणे हे काम पुरुषांचे होते. पंचमहाभूते, वृक्ष, स्थलदेवता, मृतात्मे यांसारख्या अतिमानुषी शक्तींवर ताबा चालविणाऱ्या पुरोहिताचा व्यवसाय गटाचा नायक किंवा वयोवृद्ध स्त्री वा पुरुष यांपैकी कोणीही करीत असे.

उत्तरपुराणयुगातील व आंतराश्मयुगातील गुहांच्या भिंतींवरील चित्रे, त्यांत सापडणाऱ्या स्त्रीमूर्ती, हाडे व शिगें यांवरील कोरीवकाम, अशा कलावस्तूंची निर्मिती हा या कालखंडात प्रचलित झालेला आणखी एक व्यवसाय होय. यांतील बरीच चित्रे व मूर्ती धार्मिक विधींशी निगडित होत्या. तेव्हा त्यांची निर्मिती करणारी माणसे अर्थातच समाजाने पोसलेली असावीत, असे दिसते. याच काळात हत्यारांसाठी गारगोटीसारखे दगड वापरू लागले. हे दगड निरनिराळ्या गटांना पुरविणे हाही एक स्वतंत्र व्यवसाय उदयास आला असावा. उत्तरपुराणाश्मयुगीन व आंतराश्मयुगीन हत्यारे आकाराने लहान पण वैविध्यपूर्ण होती. ती तयार करण्यास विशेष कौशल्याची आवश्यकता असल्याने अशा कारागिरांना साहजिकच गटात स्वतंत्र स्थान व महत्त्व प्राप्त झाले असावे.

एकीकडे रक्तसंबंध आणि व्यावहारिक गरज यांमुळे निर्माण होणारे ऐक्य, दुसरीकडे स्त्रीपुरुषसंबंधातून उत्पन्न होणारे व व्यवसायप्रावीण्यापोटी उद्भवलेले ताण, यांच्या संघर्षातून समाजगट टिकविण्याची व्यवस्था काय असावी? या संदर्भात व्यवहारचातुर्य व औदार्य यांच्या जोडीला दंडशक्तीचीही गरज असली पाहिजे. ह्या दंडशक्तीचा वापर करण्याचे काम पुरोहिताकडे असावे. अतिमानुषी शक्तीवरील श्रद्धेचा उपयोग सामाजिक ऐक्य टिकविण्यास होत असे. याला परंपरा व रूढी यांचा चांगलाच आधार मिळत असावा.

नवाश्मयुगात उपजीविकेच्या साधनांत मूलभूत क्रांती घडून आली. पशुपालन अथवा शेती यांमार्गे होणारी अन्नप्राप्ती आणि शिकारीतून होणारी प्राप्ती यांत एक फार महत्त्वाचा फरक आहे. या भेदाचे परिणाम दूरगामी ठरले. शिकार मिळविण्यास फार तर एकदोन किंवा तीनचार दिवस जात, परंतु एकदा मेलेला प्राणी हाताशी आला, की लगेच खाता येई शिकार करणे हे काम सतत चालू असले, तरी त्यातून फलप्राप्ती जवळजवळ तत्काळ होत असे. आता मेंढ्या वा गुरांचे कळप बाळगावयाचे म्हणजे, गुरे वाढवावयास हवीत. शेतात धान्य पेरल्यानंतर प्रत्यक्ष धान्य हाती येईपर्यंत तीन ते सहा महिने इतका काळ वाट पाहत बसावयास पाहिजे. तसेच धान्य पेरण्याच्या आधी त्या जमिनीची मशागत केली पाहिजे. माणसाचे अवधान सतत त्याच गुरांच्या कळपावर पाहिजे, त्याच जमिनीच्या तुकड्यावर पाहिजे. यामुळे अधिकाधिक आपुलकी निर्माण झाली व तिचेच रूपांतर स्वामित्वाच्या भावनेत झाले. याचीच दुसरी बाजू अशी, की कळपातील गुरांपासून अन्न मिळणार ते त्यांची जोपासना करणाऱ्याला–दुसऱ्याला नव्हे. म्हणजे उपजीविकेच्या साधनांवर मालकी हक्काचा उदय झाला. आरंभी ही मालकी प्रत्येक गटाची सामूहिक होती. नंतर कुटुंब हा महत्त्वाचा दुवा झाला आणि शेवटी तेथे व्यक्ती आली. एकेका व्यकीच्या मालकीचे कळप किंवा शेतजमीन या वेळी नव्हती पण एकेका कुटुंबाच्या सर्वस्वी मालकीची स्थापना मात्र झालेली दिसते. याचे साधे कारण असे, की कोणाही व्यक्तीला अधिकार आणि कर्तव्य यांची सर्वांत फायदेशीर जोड कुटुंब या समूहाद्वारेच मिळण्यासारखी होती. जमिनी वर्षानुवर्षे टिकवून धरावयाच्या याचाच अर्थ वारसा म्हणून त्या मिळावयाच्या, तर तो अधिकार कोणाचा हे स्पष्ट करणे म्हणजे कुटुंब या संस्थेचे रूप नक्की ठरणे आवश्यक होते. नवाश्मयुगाच्या आरंभीच्या काळात पितृसावर्ण्य रूढ झाले. आता पुराणाश्मयुग व आंतराश्मयुग यांतल्यासारखी स्थिती राहिली नाही. या कालखंडातील माणसाला एकाच ठिकाणी स्थायिक होणे अत्यावश्यक झाले. केवळ पशुपालन व मेंढपाळी करणाऱ्या लोकांना चराऊ कुरणाच्या शोधार्थ थोडीशी भ्रमंती करावी लागत असली, तरी पशुपालन व शेती असे दोन्ही व्यवसाय करणारे लोक कायमचे एकत्र राहू लागले.

दगडाची हत्यारे करणे, त्याला आवश्यक ते दगडाचे प्रकार मिळविणे, थोड्याफार प्रमाणात शिकार करणे, तसेच पौरोहित्य, कलाकृती हे सर्व व्यवसाय पूर्वीप्रमाणेच आताही चालू राहिले. मात्र शेतकी आणि पशुपालन यांसंबंधीची तंत्रे अंगी आणणे जरुरीचे झाले. हेच सर्वसाधारण व्यवसाय असल्याने बहुतेक स्त्रीपुरुष यांत तरबेज झाले. आता नवीन व्यवसाय आले. घरे बांधणे, त्यासाठी सुतारकाम-गवंडीकाम आले वस्त्रे विणणे आणि नवाश्मयुगाच्या उत्तरार्धात मृत्पात्रे तयार करणे ह्याही गोष्टी आल्या. यांतील वेतकाम, बुरूडकाम यांसारखे काही पूर्वापार व्यवसाय होते. त्यांत वस्त्रे विणणे याची भर पडली. मृत्पात्रे तयार करणे, ती रंगविणे हे व्यवसाय स्त्रियाही करीत. सर्व लोक निरनिराळे व्यवसाय करीत होते. पण निरनिराळ्या उत्पादनांची गुणवत्ता पाहिल्यानंतर असे वाटते, की प्रावीण्य मिळविलेल्या माणसांचेच हे काम असले पाहिजे. म्हणजे व्यवसाय व त्यातील प्रावीण्य यांच्या अनुषंगाने समाजाची व्यावसायिक विभागणी झाली होती. असे कुशल कारागीर एकाच गावात राहत की इतर गावांत काम करीत, हे ज्ञात नाही. परंतु व्यावहारिक सोयीच्या दृष्टीने पाहिल्यास ते फिरते असण्याचा अधिक संभव वाटतो. फिरत्या कारागिरांच्या पाठोपाठ फिरते व्यापारीही आले असावेत. इतकी कुटुंबे कायमची एकत्र राहू लागली. गुरेढोरे, शेतजमिनी यांवर कौटुंबिक (खाजगी) मालकी निर्माण झाली. तंत्रज्ञांमुळे काही व्यवसायांवर एखाद्या कुटुंबाची वा माणसाची मक्तेदारी आली. म्हणजे साहजिकच संघर्ष-प्रसंगांची शक्यता वाढली. आतापर्यंत सामाजिक संघर्षाला पोषक असे घटक अश्मयुगीन समाजात नव्हते. अतिमानुषी शक्तीवर श्रद्धा, मृतात्मे, पुरोहित, वडीलधारी माणसे, परंपरा यांचे समाजावर नियंत्रण होतेच. परंतु आता दंडनीती आणि शासनसंख्या अत्यावश्यक झाली. याच संस्थेकडे समाजाचे व त्याच्या मालमत्तेचे बाह्यशत्रूकडून रक्षण करण्याचे दायित्वही आपोआप आले. अशी संस्था कोणत्याही स्वरूपाची असेल त्यावर वडिलधाऱ्या मंडळीची सभा, एक वयोवृद्ध वा अनुभवी पुढारी-धर्मगुरू (पुरोहित) प्रमुख म्हणून असावा.

शेवटी नवाश्मयुगीन समाज शाश्वत पायावर उभा राहून समाजरचनेत महत्त्वाचे बदल घडले आणि कुटुंब ही संस्था श्रेष्ठ ठरली. यातून नियंत्रणाची गरज निर्माण होऊन शासनसंस्थाही याच काळात उत्पन्न झाली असावी. तिचा आवाका लहान असला, तरी मूलभूत लक्षणे तेथून दृग्गोचर होऊ लागतात. या समाजा- च्या तंत्रज्ञानाविषयी बरीच माहिती उपलब्ध झाली आहे.

वसतिस्थाने : अश्मयुगीन वसाहतींचे स्वरूपही वैविध्यपूर्ण होते. वसाहतींचा विचार करण्यापूर्वी फुटकळ निवासस्थानेच आधी पाहावयास पाहिजेत. निवासस्थानांचे स्वरूप तत्कालीन हवामानावर अवलंबून होते. त्यानुसार सामान्यपणे निवासांचे दोन प्रकार दिसतात. गुंफा वा प्रस्तरालय यांसारखी नैसर्गिक आणि झोपड्या किंवा तंबू यांसारखी कृत्रिम आवरणे निवासासाठी वापरीत. पुराणाश्मयुगातील पहिल्या दोन भागांत हवेतील तपमानाचे चढउतार तीव्र असल्याने, विशेषत: हिवाळा फारच कडक असल्याने, मानवाने गुंफांचा वा थोड्या पुढे झुकणाऱ्या कडेकपाऱ्यांचा आश्रय सर्वत्र केलेला होता. सर्व प्राचीन ज्ञात अशा गुहा चीनच्या जोकोत्येन (Chou-kou-tien) भागातच आढळल्या आहेत. त्यानंतरच्या गुहा यूरोपमधे दक्षिण फ्रान्स व उत्तर स्पेन, आशियात पॅलेस्टाइन व सिरिया आणि आफ्रिकेतील मोरोक्को येथे आढळतात. अल्जिरियाच्या भूमध्य सागरा- नजीकच्या प्रदेशात मध्याश्मयुगातील वस्त्यांचे अवशेष मिळाले आहेत. यांतील काही गुंफांत उत्तरपुराणाश्म- युगात वस्ती झाली, तर काहींत आंतराश्मयुगातही वस्ती होती. भारतातील मध्य प्रदेशातील गुहा आंतराश्म- युगीन आहेत, तर अमेरिकेतील गुहा सांस्कृतिक दृष्ट्या अश्मयुगाच्या विविध टप्प्यांतील आहेत. तरीसुद्धा त्या कालदृष्ट्या नजीकच्या आहेत. पण सर्व गुहांतील किंवा प्रस्तरालयांतील निवासांत काही समान विशेष दिसतात. निवासाला गुहा वा कपाऱ्या निवडताना त्यांची तोंडे वाऱ्याच्या दिशेला येणार नाहीत अशी काळजी घेतली जात असे. गुहांच्या तोंडाशी काही आडोसे असलेच, तरी त्यांविषयी विशेष माहिती मिळत नाही. गुहा बरीच खोल असेल, तर मुखाच्या भागातच वस्ती होई. तथापि फार खोलातली जागा टाळलेली दिसते. या आतल्या भागाचा चित्रकामाला वा काही पूजाअर्चा यांसारख्या विधींना उपयोग होत असावा. त्यांना ‘मंदिरे’ किंवा ‘पूजास्थाने’ अशीही नावे यामुळे दिली जातात. अत्यंत कडाक्याच्या हिवाळ्याला उतार पडल्याबरोबर तळी, नद्या यांच्या काठी माणसे उघड्यावरही राहत असतील, अशा काही ठिकाणी त्यांच्या अस्तित्वाचा निर्णायक पुरावा ⇨ ओल्हुवायी गॉर्ज (आफ्रिका) येथे मिळाला आहे. तेथे त्यांनी काही झोपड्या वा घरे बांधली. याविषयीच्या खाणाखुणांचा मात्र काहीच मागमूस आज लागत नाही. माणसाने उभारलेल्या आसऱ्या- चे स्पष्ट अवशेष उत्तरपुराणाश्मयुगातच प्रथम मिळतात. तेही एका विशिष्ट भागातच आणि एका विशिष्ट समाजगटाशी निगडित आहेत. आग्नेय यूरोपात चेकोस्लोव्हाकियात व्हिस्टोनीस, ऑस्ट्रोव्हा व पेट्रोव्हिज दक्षिण रशियात डॉन नदीवरील गागारिनो येथे व सायबेरियात टिमोनोव्हका येथे हे अवशेष मिळतात. पहिल्या दोघांचा संबंध ग्रेव्हॅटियन लोकांशी आहे आणि भीमगज या अजस्र प्राण्याची शिकार हाच त्यांचा मुख्य व्यवसाय असल्याने या लोकांना त्याच्या पाठोपाठ विरळ जंगलात येऊन राहणे भाग पडले. स्वाभाविकच त्यांनी काही आश्रयस्थाने बांधली. यांना घरे म्हणण्यापेक्षा तंबू वा झोपड्या म्हणणे अधिक सोयीचे ठरेल. वर्तुळाकार वा लंबवर्तुळाकार अशा रचनेच्या या झोपड्या आकाराने पुष्कळच मोठ्या असत (उदा., व्हिस्टोनीस : १५ मी. लांब व ९ मी. रुंद). यांवर झाडाच्या फांद्या तिरप्या एकमेकांना टेकून त्यांवर पाला, गवत वा कातडे पसरण्यात येत असे. जेथे सबंध छप्पर कातडी एकमेकांना जोडून तंबूसारखे करीत, तेथे ताण देण्यासाठी मोठाले घोडे वा भीमगजाचे सुळे त्यांच्या कडेवर ठेवलेले दिसतात. छप्पर जमिनीवरच टेकत असल्याने भिंतीची गरजच नव्हती. परंतु एखाद्या ठिकाणी, विशेषतः जमीन उतरती असल्यास, दगडामातीची लहानशी भिंतही बांधण्याची विद्या त्यांना ज्ञात होती (व्हिस्टोनीस). भोवतालच्या जमिनीपेक्षा घराची जमीन खोलगट असे. जमिनीवर सपाट दगड अंथरून क्वचित फरशीही केलेली दिसते. मध्यभागी ओळीने चुलखंडे घातलेली असत– एका झोपडीत अशी पाच चुलखंडे आहेत. परिघानजीक खळगे करून साठवणाची व्यवस्था होई. टिमोनोव्हका (सायबेरिया) येथे उत्तरपुराणाश्मयुगात प्रचारात असलेल्या दुसऱ्या एका प्रकारच्या घरांचे अवशेष मिळाले आहेत. ही घरे कडाक्याच्या थंडीपासून बचाव करण्यासाठीच तयार केलेली असावीत, यात शंका नाही. यांना कृत्रिम गुंफा म्हटले तरी चालेल. त्यांच्या रचनेसाठी जमिनीत तीन मी. किंवा अधिकही खोल असा गोल खड्डा करण्यात येई. याचा व्यासही तेवढाच आहे. आत जाण्यासाठी जिना असे. वरच्या बाजूने मोठाली लाकडी आडवाटे वा बांबू टाकून त्यावर गवत, पाला व चिखल थापून छप्पर तयार करीत. साधारणपणे जिन्यानजीक किंवा झोपडीच्या (खड्ड्याच्या) बाहेर उघड्यावर चुली पेटविण्यात येत. चीनमधील शान्सी प्रांतात तसेच भारतात काश्मीरमध्ये ⇨ बुर्झाहोम येथे अशा प्रकारची घरे सापडली आहेत. मात्र दोन्ही ठिकाणी ती नवाश्मयुगातीलच आहेत. परंपरेच्या सातत्याची कल्पना देण्यासाठी त्यांचा येथे उल्लेख केला आहे. आंतराश्मयुगीन निवासांची सर्व माहिती बव्हंशी यूरोपातूनच मिळालेली आहे. पुराणाश्म- युगाच्या मानाने हवामान बरेच उष्ण असल्याने गुहांतून वा प्रस्तरालयांतून राहण्याची किंवा खड्ड्यासारख्या घरांतून राहण्याची आता जरूर नव्हती. त्यामुळे वर्षभर उघड्या मैदानावर आता राहता येऊ लागले. स्वाभाविकच घर बांधण्याची विद्या आता प्रगत झाली. या प्रगतीला मुख्य हातभार कशाचा लागला असेल, तर तो माणसाच्या जीविताला लाभलेल्या स्थैर्याचा. विशेषतः नद्यांच्या वा तलावांच्या आसपास बारमास मासळी मिळू लागली. तेव्हा येथे राहणे आवश्यक झाले. या वेळेपर्यंत जंगलाची वाढही झालेली होती व लाकडाचा सफाईने उपयोग करता येऊ लागला. परिणामी जास्त टिकाऊ व प्रशस्त घरे या काळात रूढ झाली. घर बांधण्यासाठी वाळवंटी (कोरडी) किंवा थोड्या उंचवट्यावरची जमीन निवडण्यात येऊ लागली. कोरडी जमीन मिळाली नाही, तर तीवर फांद्या, पालापाचोळा, झाडाच्या साली अंथरीत (जर्मनी–लूबेक इंग्लंड–स्टारकार) व त्यावर माती पसरून कोरड्या जमिनी तयार करीत. घरे सामान्यतः गोल व लंबगोल आराखड्याची असत. लाकडी (फांद्यांच्या) भिंती व तशीच छपरे असत. क्वचित कातडी छप्परही असे. घर उभे करताना कोठे कोठे दगडांचा वापरही केला आहे. आतापर्यंतच्या काळात सहसा न आढळणारी एक गोष्ट आता दिसू लागते ती म्हणजे घरांचे समूह. इंग्लंडमध्ये सरे परगण्यात किंवा डेन्मार्क-हॉलंडमध्ये असे समूह अनेक ठिकाणी आढळतात. मात्र ही सगळी घरे एकाच वेळी वापरात होती का पुन्हापुन्हा नव्याने बांधीत याविषयी निश्चित माहिती नाही. कारण गृहसमूहांना आनुषंगिक अशा रस्ते किंवा सरंक्षणयोजना कोठेच दिसत नाहीत. त्या पुढे आल्या.

जीविताच्या इतर शाखांप्रमाणे याही क्षेत्रात नवाश्मयुगात क्रांतिकारक बदल झालेले दिसतात. नव्या जीवनपद्धतीत स्थिर वस्ती ही समाजाची गरज झाल्याने जास्त टिकाऊ निवासस्थाने आवश्यक झाली. स्वाभाविकच चिवट व बळकट सामान कौशल्याने वापरण्यात येऊ लागले. लव्हाळे, बांबू, कातडी यांच्या ऐवजी आता मोठाले लाकडी ओंडके, दगड, कच्च्या विटा यांचा उपयोग होऊ लागला. नवाश्मयुगीन निवासस्थानांत स्थलकालपरत्वे खूपच वैविध्य आढळते. घरांचा आराखडा आता गोल, चौरस वा आयत अशा आकारांचा झाला. मध्याश्मयुगातही भिंत हा घटक फारसा कोठे आढळत नाही. आता बांबूच्या-वेताच्या तट्ट्यापासून, दगड, कच्च्या विटा यांच्या बांधलेल्या अशा सगळ्या प्रकारच्या भिंती दिसून येतात. या भिंतींवर गिलावा करून त्यावर रंगकामही केलेले आढळते (जार्मो). भिंती भक्कम करण्यासाठी त्यांखाली दगडी जोती ठेवण्याच्या प्रथेचाही आरंभ झालेला दिसतो (जार्मो). भोवतालच्या जमिनीपेक्षा घराची जमीन थोडीशी खोलगट करण्याची प्रथा आताही बऱ्याच भागांत चालूच राहिली. छपराचे स्वरूप मुख्यत्वे बांधकामाची साहित्यपद्धती व पर्जन्यमान यांवरच अवलंबून राहिले. पावसाळी भागात लाकडी उतरती वा दगड-विटा यांची घुमटाकार व इतरत्र सपाट अशी छपरे इमारतींवर असत. ⇨जेरिको (पॅलेस्टाइन), खिरोकिटिया (सायप्रस), हसौना (उ. मेसोपोटेमिया) हे अवशेषांचे त्याबाबतचे नमुने होते. कालांतराने घरांमध्ये एकच दालन ठेवण्याऐवजी त्याच्या खोल्या पाडण्यात येऊ लागल्या. सायप्रसमधील खिरोकिटिया येथील वर्तुळाकार घरात पोटमाळा काढलेला होता. त्याला पक्क्या खांबांचा आधार होता, तरीही जिना मात्र पक्का नव्हता. तेथे साध्या शिडीचाच उपयोग केलेला असावा. उपलब्ध जागेच्या विभाजनाचा हा एक स्वतंत्र व फारसा रूढ न झालेला प्रकार. खोल्यांची कल्पना रुजल्यावर कित्येक ठिकाणी समोर ओवरी, त्यामागे एकापाठोपाठ एक अशा दोन खोल्या, अशीच मांडणी हलाफ (सिरिया) येथील अवशेषांवरून दिसते. यापुढे हसौना येथे एका उघड्या चौकाभोवती अनेक खोल्या मांडलेल्या दिसतात. सर्व खोल्यांना हवा व उजेड पोचण्यास ही योजना उपयुक्त होती, तसेच सगळ्यांभोवती एक मोठी भिंत असल्याने सगळे घर सुरक्षित राही. आर्पाकिया (उत्तर इराक) या ठिकाणी घरांची थोडी निराळी रचना सापडते. वर्तुळाकार रचनेचीच ही थोडी सुधारलेली आवृत्ती असावी. या घराचे दोन भाग दिसतात. एक वर्तुळाकार दालन व त्याच्या समोर आयता- कार दालन दिसते. या दालनाला प्रवेशद्वार असावयाचे. पण हा आराखडा अपवादात्मक होय. एरवी गृह-

रचनेच्या विद्येतील सर्व मूलभूत घटक–वास्तुसाहित्य, वास्तुरचना, तंत्र, वास्तुविधान व सुशोभन–नवाश्म- युगीनांनी आत्मसात केलेले दिसते. वास्तुविद्येची ही सर्व प्रगती मुख्यत्वे पॅलेस्टाइन, तुर्कस्तान, इराक या भागांत व भूमध्य समुद्रातील काही बेटांत झाली, हे ध्यानात घ्यावयास हवे. कारण साधारणत: याच भागात नवाश्मयुगीन संक्रमण सिद्धीस पोचले असावे, असे समजतात.

यूरोप, चीन, भारत व ईजिप्त या ठिकाणी नवाश्मयुगीनांनी बांधलेली घरे बरीचशी निराळी आहेत. यूरोप- मध्ये गृहरचनेस लाकडाचाच उपयोग होत गेला. आयताकार वा चौरस घरे भक्कम लाकडी किंवा बांबूच्या सांगाड्याभोवती बांधीत. भिंती आणि बहुधा छपरेही फळ्यांची केलेली असत. क्वचित त्यांवर गवत पसरीत (फेडर्झे, कोलोन-लिंडन्थॉल), ईजिप्तमध्ये ⇨ फायूम येथे बांबू व तट्ट्या यांच्या झोपड्या वापरीत असावेत असे दिसते. यानंतरच्या मेरिम्डीयन समाजाने अशा झोपड्यांची छपरे घुमटाकार बनवून त्यांवर चिखल थापण्यास आरंभ केला. चीन व भारत या दोन्ही ठिकाणी सामान्यपणे लाकूड व गवत यांच्या वर्तुळाकार वा चौकोनी झोपड्या वापरलेल्या दिसतात (टेक्कलकोटा). क्वचित प्रस्तरालयाचाही आश्रय केलेला होता. परंतु चीनच्या शान्सी व भारताच्या काश्मीर भागात खड्ड्यांत केलेली घरे या काळात वापरीत.

आंतराश्मयुगात काही ठिकाणी पाचसात घरांचे समूह दिसले, तरी त्या वेळी ग्राम या कल्पनेचा जन्म झाला नव्हता. नवाश्मयुगात बरीच माणसे कायमची एका ठिकाणी राहणार, म्हणजे बरीच घरे एकमेकांशेजारी बांधली जाणार, असे झाल्यावर या सहवासाचा अर्थ व त्यातील प्रश्न समजावयास लागले. या माणसांना ये-जा करण्यास मार्ग हवेत, म्हणजे रस्ते हवेत. नवाश्मयुगातील बर्‍याच मोठ्या कालखंडात रस्ता ही कल्पना ज्ञात नव्हती. दोन घरांच्या मध्ये उरणाऱ्या जागेतूनच दळणवळण चाले. हे सोयीचे करण्याचे प्रयत्न क्वचित काही ठिकाणी झालेले दिसतात. आर्पाकिया येथे अशा वाटांवर दगड अंथरले होते, तर खिरोकिटिया येथे मुख्य रस्त्यावर फरसबंदी केलेली होती. परंतु ही उदाहरणे अपवादात्मक होत. यूरोपातील काही वसाहतींत (फेडर्झे) घरे एका ओळीत बांधून मध्यभागी हेतुत: रस्ते ठेवलेले दिसतात. इतरत्र अशी योजनापूर्वक मांडणी सापडत नाही. वाहने नसल्याने खेड्यांना एकमेकांशी जोडणारे रस्ते निर्माण होण्याची शक्यताच नव्हती. खेड्यांच्या रक्षणासाठी काही बांधकाम करण्याची व्यवस्था नवाश्मयुगात प्रथम झाली. इ.स.पू. आठव्या सहस्रकात जेरिको येथे एक प्रचंड दगडी तटबंदी उभारण्यात आली होती. पण हेही एकुलते एकच उदाहरण आहे. नवाश्मयुगाच्या अगदी शेवटी शेवटी भूमध्य सागराभोवतालचा प्रदेश व पश्चिम आशिया या भागांतील काही ठिकाणी विटांच्या तटबंद्या बांधण्यात आल्या (मर्सीनू, हसितकार, ट्रॉय). उत्तर व मध्य यूरोपातील वसाहतींभोवती लाकडी तटबंद्या व खंदक आढळले आहेत (कोलोन-लिंडन्थॉल). फ्रान्समध्ये काही टेकड्यांच्या माथ्याभोवती असणाऱ्या दगडी भिंती याच काळातील समजतात. ही सर्व उदाहरणे फुटकळ आणि काळ व स्थळ या दोन्ही दृष्टींनी एकमेकांपासून दूरची आहेत. म्हणून ग्राम अस्तित्वात आले, तरी ग्राम-योजना व ग्राम-संरक्षण या कल्पनांचे आकलन झाले होते किंवा त्या रुजल्या होत्या, असे निश्चितपणे म्हणता येत नाही.

दळणवळणासाठी वाहने वापरली जात असल्याची शक्यता असली, तरी प्रत्यक्षात वाहने होती किंवा कसे आणि असल्यास त्यांचे स्वरूप काय असावे, हे सांगता येत नाही. प्राणी माणसाळविलेले असल्याने ओझे लादून नेण्यास वा बसून जाण्यास उपयोगी होत असावेत. उत्तरपुराणाश्मयुगात होड्या करता येऊ लागल्या होत्या. नदीत अगदी थोड्या अंतरावर जाऊन मच्छीमारीसाठी त्यांचा वापर होई. नवाश्मयुगात होड्या होत्याच. त्यांचा आकार थोडा वाढला होता. या काळाच्या शेवटी कदाचित शिडीही वापरण्याची विद्या मानवाला साध्य झाली असावी. मात्र ही प्रगती पूर्णपणे स्थानिक होती. ती नाईल नदीवरील प्रवासापुरतीच मर्यादित होती.

हत्यारे व आयुधे: आपल्या अंगातील नैसर्गिक शक्तीला भोवतालच्या पदार्थांची जोड देऊन स्वत:ला अधिक कार्यक्षम बनविणे हा कोणत्याही मानवी तंत्रज्ञानाचा प्राथमिक उद्देश असतो. अश्मयुगात मानवाने लाकडे, हाडे व मुख्यत: दगड यांचे साहाय्य घेतले. त्यापासून आपल्या उपयोगी पडतील अशी उपकरणे व आयुधे घडविण्यास त्याने आरंभ केला. किंबहुना उपकरणे व आयुधे वापरण्याची बुद्धी व ती तयार करण्याची शक्ती ही मानवाची व्यवच्छेदक लक्षणे समजावी लागतात. अश्मयुगातील तंत्रविषयक प्रगतीच्या दिशा पुढीलप्रमाणे होत : एखाद्या विशिष्ट कामाला विशिष्ट आकाराचीच उपलब्ध वस्तू (दगड) जास्त उपयोगी पडते ही जाणीव त्यास झाली. ही जाणीव एकाएकी प्राप्त न होता अनुभवातूनच उत्पन्न होते. त्यामुळे विशिष्ट आकाराच्याच दगडांची निवड करून, हव्या त्या आकारांचे दगड न मिळाल्यास, जे दगड हाताशी असतील त्यांना मनाजोगता आकार देण्यास त्याने सुरुवात केली.यासाठी दगडाचे टवके व तुकडे उडविणे व योग्य आकार देणे त्यास क्रमप्राप्तच होते. पूर्णपुराणाश्मयुगाच्या आरंभापासूनच येथपर्यंत त्याने मजल मारलेली दिसते.दगडाचा आकार जसा निवडता आला, तसाच त्याचा प्रकारही मानव निवडू लागला.ठिसूळ

दगडांचे आडवे कातळ निघू शकतात, हेही ज्ञान त्यास होऊ लागले. त्याचप्रमाणे तो उपकरण-प्रकाराला जास्त अनुकूल असा दगडाचा प्रकारच निवडू लागला. पुराणाश्मयुगाच्या मध्य व उत्तर खंडांत त्यास अशी पारख पूर्णत्वाने प्राप्त झालेली दिसेत. लहान आकाराचे छिलके व पाती यांसाठी चर्ट (Chert), ॲगेट (Agate) असे अत्यंत घट्ट व एकसंध पाषाणप्रकार त्याने निवडलेले दिसतात. निवडलेल्या पाषाणप्रकारांतून अपेक्षित आकार घडविण्याच्या पद्धतींत पुढे वैविध्य आले व प्रगती झाली. बदामी आकारचे व बहुविध उद्योगांचे ‘हातकुऱ्हाड’ नावाचे हत्यार तयार करण्याच्या दोन पद्धतींवरून हा मुद्दा जास्त स्पष्ट होईल. अबेव्हिलियन पद्धतीत दगडाचे मोठाले टवके उडवीत, त्यामुळे आयुध ओबडधोबडच राहत असे. अश्यूलियन पद्धतीत टवके उडवून हलकेहलके इष्ट आकार घडवीत. त्यामुळे सलग व धारदार अशी कड व अणकुचीदार टोक तयार होई. केवळ दगडाचे आयुध वापरण्याऐवजी त्याला लाकडी किंवा हाडाच्या दांड्याची जोड द्यावी, हे ज्ञान त्यास होऊ लागले. दगडी हत्यार काठीला वा हाडाला बांधून दांड्यात भोक पाडून त्यात दगड, किंवा दगडात भोक पाडून त्यात दांडा, तो अडकवू लागला. दांड्याला खाचा पाडून त्यात तो दगड बसवू लागला. त्यामुळे कुऱ्हाडी, विळे, बाण असे संयुक्त आयुध बनू लागले. उत्तरपुराणाश्मयुगापासून पुढे संयुक्त आयुधे विशेष प्रचलित झालेली दिसतात. यासाठी दगडाच्या लहान आकाराच्या छिलक्या व पाती तयार करण्यास या वेळेपासूनच प्रारंभ झाला होता. आंतर व नव या दोन अश्मयुगांत या छोट्या पात्यांचा उपयोग करून हरतऱ्हेची संयुक्त आयुधे बनविण्यात मानवास प्रावीण्य प्राप्त झाले. बाण, सुऱ्या, विळे, खुरपी अशी अनेकविध उपकरणे आता तयार झाली. लहानलहान भाग एकत्र आणून आयुध तयार करण्याची ही पद्धती पूर्वीच्यापेक्षा अधिक वेळ खाणारी व विशेष कौशल्याची होती. परंतु यामुळे उत्पन्न झालेली आयुधे विविध प्रकारची तर होतीच, पण कार्यक्षमही होती. उपकरणे वा आयुधे यांच्या निर्मितितंत्राची उत्क्रांती विचारपूर्वक किंवा पूर्व-

योजनेप्रमाणे झाली नाही. गरजा, उपलब्ध सामग्री आणि परंपरागत ज्ञान यांच्या समन्वयातून ती होत गेली. उदा., पुराणाश्मयुगात मुख्यत: घातक आयुधे तयार झाली, तर नवाश्मयुगात शेतकी व्यवसायाला उपयोगी अशी विळा, खणण्याची काठी ही अवजारे तयार होत होती. क्षेपणायुधांत भाला, भालाफेकीची काठी, बोला, धनुष्यबाण व गोफण ही सर्व प्राणघातक आयुधे होती. मुख्यत: शिकारीसाठी वापरण्यात येणारे आयुध म्हणजे भाला. टोकदार काठी हेच भाल्याचे पहिले रूप होय. टोक भाजून, टणक करून, टोकाला दगडी फाळ लावून ते केलेले असे. हे भाले जास्त दूरवर फेकता यावेत म्हणून त्यांच्या एका टोकाला उंचवटा असणारी काठी उत्तरपुराणाश्मयुगात काही ठिकाणी वापरात आली. तीनचार कातडी वाद्यांच्या टोकांना गोल गोटे बसवून त्यांची दुसरी टोके एकत्र बांधलेले आयुध म्हणजे ‘बोला’. आपल्या डोक्यावर ते गरगर फिरवून जोराने भिरकावून दिले, की चक्रासारख्या फिरणाऱ्या या गोट्यांच्या तडाख्यात एखादा मोठा पक्षी सापडे किंवा त्यात श्वापदाचे पाय गुंतून ते हाती लागे. धनुष्यबाणाच्या उपयोगास आंतराश्मयुगापासून आरंभ झाला असावा. धनुष्याला कातडी वादी लावीत. बाणाला दगडाची किंवा हाडांची टोके बसवीत. गोफण हे एक प्रभावी क्षेपणायुध नवाश्मयुगात गवसले. त्यास दगड नसले तर मातीचे भाजून पक्के केलेले गोळे वापरीत असत. लाकडे व हाडे यांचा स्वतंत्र उपकरणांच्या निर्मितीसाठीही उपयोग केलेला आढळतो. लाकडाची हत्यारे कालौघात बव्हंशी नष्ट झाली तरी भाला, भालाफेकीची काठी, धनुष्यबाण व खणण्याची काठी ही महत्त्वाची अश्मयुगीन अवजारे लाकडीच होती, हे निश्चित. हाडे व शिंगे यांजपासून बनविलेल्या अनेक वस्तू आजही टिकून राहिल्या आहेत. त्यांत प्रामुख्याने बाणांची टोके, मासेमारीसाठी छोटे काटेकारी बाण, गळ, सुया, दाभणे यांचा समावेश होतो. ह्यांपैकी काही वस्तूंची निर्मिती जरी उत्तरपुराणा-श्मयुगात होऊ लागली असली, तरी त्यांतील वैविध्य व कौशल्य आंतराश्मयुगातच पाहावयास मिळते. या काळातच हस्तिदंताच्याही वस्तू बनविण्यात येऊ लागल्या.

अग्नी : तांत्रिक विद्यांच्या बरोबरीने अग्नीचेही मानवाला मोठे साहाय्य झाले आहे. अश्मयुगातील सर्वांत प्राचीन असे मानवसंबद्ध अग्नीचे अवशेष चीनमधील जोकोत्येन येथील गुहांत मिळाले आहेत. यदृच्छया निर्माण झालेला अग्नी तसाच तेवत ठेवण्याची कला जोकोत्येनच्या रहिवाशांना माहीत असावी. पुढे अश्म- युगाच्या विविध खंडांत सर्वत्र मानवाने अग्नीचा सतत उपयोग केलेला दिसतो, मात्र तो अग्नी त्याने उत्पन्न केला, की वणव्यासारख्या आगीची धग टिकवून धरली, हे सांगता येत नाही. लाकडे, हाडे किंवा क्वचित कोळसा (पॅलेस्टाइन) या कामाला सर्पण म्हणून वापरलेला असे. अग्नी निर्माण करण्याची विद्या उत्तरपुराणा- श्मयुगात साध्य झाली असण्याची शक्यता आहे. आंतराश्मयुगात व नवाश्मयुगात ती नक्कीच हस्तगत झाली होती. गारगोटी व लोखंडाचा अंश असलेला दगड यांच्या घर्षणातून अग्नी उत्पन्न करीत. अग्नीचा उपयोग कृत्रिम रीत्या उष्णता व उजेड निर्माण करणे, कच्चे मांस भाजून खाणे, जनावरांची चरबी दगडी दिव्यात घालून वाती जाळणे, जनावरांना घाबरवून स्वत:चे रक्षण करणे, काठ्यांची व हाडांची टोके भाजून ती टणक करणे इत्यादींसाठी होत असे. आंतराश्मयुग व नवाश्मयुग यांत अग्नीचा सुटसुटीतपणे वापर करता यावा म्हणून शेगड्या, चुली, भट्ट्या तयार करण्यात आल्या होत्या. स्वयंपाकाबरोबरच, मातीच्या मूर्ती अथवा भांडी भाजणे यांसाठीही नवाश्मयुगात अग्नीचा वापर झाला. अशा भट्ट्या काही नवाश्मयुगीन वसाहतींच्या अवशेषांत मिळाल्या आहेत.

उपकरणे, भांडे इ. : पुराणाश्मयुगातील व आंतराश्मयुगातील अत्यंत अस्थिर आणि भटके जीवन लक्षात घेता, मानवाला काही साठवणाची गरज भासली असेल, असे वाटत नाही. साठवून ठेवण्यासाठी वेळ अथवा निकड त्याला भासावी असे पदार्थही त्या वेळी त्याच्याजवळ नव्हते. उत्तरपुराणाश्मकालीन गुंफांतील चित्रकारांनी वापरलेले दगडी दिवे सोडले, तर अन्य कसलेही भांडे ज्ञात नाही. पुढे नवाश्मयुगाच्या पूर्वार्धात जेरिको, जार्मो येथील माणूसही फक्त दगडीच भांडी वापरीत होता. यांत कटोरे, पेले असे काही प्रकार आढळतात. दगडी भांड्यांच्या घडणीत व सजावटीत थोडा फरक स्थलकालपरत्वे आढळतो. उदा., सायप्रसमधील खिरोकिटिया येथील भांडी घासून घासून झिलईदार करण्यात येत. परंतु त्यांच्या आकारात फारसे वैविध्य नाही. दगडाप्रमाणेच लाकडी ठोकळे कोरून त्यापासून भांडी तयार करण्यात येत असतीलही, परंतु त्यांचे आज अवशेष नाहीत.

नवाश्युगाच्या पूर्वार्धापर्यंत मृत्पात्रे करण्याची विद्या मानवाला हस्तगत झालेली नव्हती. नवाश्मयुगाच्या मध्यापासून अशी भांडी बनविण्याला आरंभ झाला. निदान पश्चिम आशिया व भूमध्य समुद्राभोवतालचा प्रदेश यांपुरते तरी हे विधान निश्चित पुराव्यांवर आधारलेले आहे. मृत्पात्रे तयार करण्याची विद्या केवळ याच लोकांना साध्य झाली, असे समजण्याचे कारण नाही. तिचा उगम निरनिराळ्या ठिकाणी स्वतंत्रपणेही झाला असेल. तद्वतच ती याआधीही कोणा समाजाला साध्य झाली असेल. पण प्रत्यक्ष आधाराने सांगता येते, ते फक्त पश्चिम आशियाविषयी. या कलेचा उगम कसा झाला याविषयी जी अनेक मते प्रचलित आहेत, त्यांत जास्त ग्राह्य अनुमान असे, की आधीपासून वापरात असणाऱ्या बांबूच्या टोपल्यांना माती लिंपण्यास आरंभ झाला. एखादी अशी टोपली केवळ योगायोगाने जळाली असावी व लिंपलेल्या मातीचे झालेले तुकडे हाती लागले. अशा अपघातातून मातीच्या दोन गुणांचा शोध लागला. ते म्हणजे–मनाजोगता आकार देता येणे व

भाजूण काढले तर तो आकार पक्का होणे. याच माहितीचा उपयोग करून मृत्पात्रे करण्यास आरंभ झाला. भांडी करताना, त्यांना आधीपासून दगडी-लाकडी भांड्यांना देण्यात येणारे वाडगे, कुंडे यांसारखे आकार तर दिलेच पण ठेवरेवीला, विशेषत: पाणी व तत्सम द्रवपदार्थ यांच्या ने-आणीला, जास्त उपयुक्त अशी लहान तोंडाची भांडीही तयार करण्यात येऊ लागली. भोपळा, नारळ अशांसारख्या फळांवरून हे आकार सुचले असावेत. कदाचित या फळांच्या कवचांचा असा उपयोग यापूर्वीही केला जात असावा. लवकरच या भांड्यांना रंग लावून व त्यांवर नक्षी उमटवून ती सुशोभित करण्यासही सुरुवात झाली असावी. यापुढे निरनिराळे आकार, भांडी घडविण्याच्या पद्धती यांचे शोध लागत गेले. चाकाचा शोध लागला अधिक प्रमाणबद्ध व डौलदार भांडी तयार होऊ लागली. भांडी भाजण्यासाठी निरनिराळ्या प्रकारच्या भट्ट्याही वापरात आल्या. परंतु हा सर्व पसारा नवाश्मयुग व ⇨ताम्रपाषाणयुग यांच्या संधिकालातीलच आहे.

बांबू, लव्हाळे व वेत एकत्र गुंफून, मासे पकडण्यासाठी खूप मोठाल्या टोपल्या आंतराश्मयुगीन यूरोपात (डेन्मार्क – एर्टेबोल संस्कृती) वापरीत. याच्या पुढची पायरी म्हणजे चटया विणणे आणि शेवटी घरगुती उपयोगाच्या लहानमोठ्या टोपल्या, दुरड्या विणणे ही होय. पॅलेस्टाइनमधील जेरिको व जार्मो आणि ईजिप्तमधील फायूम यांसारख्या ठिकाणच्या नवाश्मयुगीन थरांत मातीवर उमटलेल्या ठशांच्या स्वरूपात टोपल्या व दुरड्या यांचे अवशेष पाहावयास सापडतात. यांग-शो या चिनी नवाश्मयुगीन समाजास बुरूडकाम अवगत होते. अमेरिकेतील बुरूडकामाचा पुरावा साधारण पॅलेस्टाइनइतकाच इ.स.पू. सातव्या सहस्रकातील असून दक्षिण अमेरिकेतील बुरूडकाम अत्युकृष्ट दर्जाचे समजले जाते.

धर्म : पुराणाश्मयुगातील व आंतराश्मयुगातील धार्मिक जीवनात मुख्य साधन म्हणजे गुहांतील चित्रे होत. ह्या गुहा मंदिरे वा प्रार्थनास्थळे म्हणून वापरण्यात येत असत. नवाश्मयुगात प्रथमच मंदिर किंवा प्रार्थनास्थान उभारलेले दिसते. मध्याश्मयुगातील व्हिस्टोनीसचे पुरोहिताचे घर सोडले, तर यापूर्वीच्या काळातील धार्मिक स्वरूपाची कोणतीच वास्तू मिळालेली नाही. जेरिका येथील मंदिरे आयताकार होती. क्वचित त्यांच्या समोर एक ओवरी आणि एक छोटासा मंडपही दिसतो. दारासमोरच्या भिंतीत कोनाडा करून त्यात दगडी खांब वा मूर्ती ठेवती. आर्पाकिया येथे एक प्रशस्त घुमटाकार मंदिर आहे. गाभारा गोल (व्यास ९ मी.) व त्यासमोर आयताकार मंडप (लांबी १८ मी.) आहे. दोन्ही ठिकाणी घराचीच रचना थोड्याफार फरकाने मंदिरासाठी वापरलेली आहे, हे स्पष्ट दिसते. तुर्कस्तानातील नवाश्मयुगीन अवशेषांत (कटाल हयुक) हीच गोष्ट अधिक स्पष्ट दिसते. तेथील मूर्तिकाम, भिंतीवरील चित्रे व शिल्पे यांमुळे या वास्तू धार्मिक उपयोगाच्या असाव्यात हे कळते. त्या वेळी धार्मिक वास्तूंना काहीं ठळक वैशिष्ट्ये प्राप्त झाली असावी, हे उब्राइड संस्कृतीच्या अवशेषांवरून स्पष्ट होते (एरिडू व टेपे गौरा). आयताकार दालनाच्या एका टोकाला मूर्तीचे पीठ अथवा स्थंडिल आहे. बाहेरून जोते बरेच उंच ठेवीत. अनेक भित्तिस्तंभ किंवा क्षेपप्रतिक्षेप आहेत. सुमेरियन काळातील ⇨झिगुरातसारख्या मंदिराच्या वास्तूंच्या रचनावैशिष्ट्यांचा उगम येथे पाहावयास सापडतो. ह्याशिवाय दगडी, मातीच्या वा हाडाच्या मूर्ती आणि थडगी यांवरूनही धार्मिक जीवनासंबंधी बरीच माहिती मिळते. त्याच्या धार्मिक कल्पना निश्चितपणे काय होत्या, ह्याविषयीचा कसलाच स्पष्ट पुरावा आज मिळत नाही. तसेच वैयक्तिक व सामाजिक स्मृतींतून निर्माण होणाऱ्या दंतकथा व परंपरा यांचीही माहिती आपल्याला नाही. मात्र पुरोहिताचे स्थान काय व तो काय कामे करीत असावा, याची थोडीफार कल्पना येते पण त्याच्या शक्तीचे गूढ समजत नाही.

जारणमारण यांसारख्या तंत्रांवर लोकांचा त्या वेळी विश्वास होता. एखाद्या जनावराच्या छोट्या प्रतिकृतीवर बाण लागल्याचे चित्र काढले, की तो प्राणी शिकारीत सहज हाती लागेल अशी कल्पना होती. फ्रान्स व स्पेन येथील अनेक गुहांत अशी कितीतरी चित्रे सापडतात. भालाफेकीच्या काठीवरील कोरीव चित्रेही याच उद्देशाने काढलेली असावीत. केवळ शिकारीवरच अवलंबून असणाऱ्या माणासाने आपल्या व्यवसायात अतिमानुषी शक्तींचे अशा तऱ्हेने साहाय्य मिळविण्याचा यत्न करावा हे स्वाभाविक वाटते. दुसरे तत्त्व म्हणजे जननतत्त्व होय. या तत्त्वाची आराधना करण्यात येत असल्याचा पुरावा अनेकविध स्वरूपांत सापडतो. वर उल्लेखिलेल्या मातृका-मूर्ती या त्यांतील प्रधान अवशेष होत. समागम करणाऱ्या पशूंच्या मूर्तीत हाच आशय आहे. एतद्विषयी काही क्रियाकर्मे (विधी) होत असावीत, असे फ्रान्समधील गुहेत असणाऱ्या पूर्णाकार नग्न स्त्रीमूर्तीवरून वाटते. तिसरी महत्त्वाची गोष्ट मरणोत्तर जीवनाविषयीची असून त्यात ‘आत्मा अमर आहे’ ही कल्पना पूर्वी पूर्वपुराणाश्मयुगातही मूळ धरून असावी. या कल्पनेच्या दोन पायऱ्या दिसतात. एक मृतात्म्याचा प्रवास व दुसरी पुनर्जन्म आणि तोही शक्यतो मानवी स्वरूपात दर्शविला आहे. यूरोपात सापडलेल्या निअँडरथल मानवाच्या थडग्यांतून अन्न, हत्यारे व क्वचित दागिनेही त्याच्या भोवती पुरलेले दिसतात. अन्न व हत्यारे ही त्याच्या मरणोत्तर जीविताची शिदोरीच होय. थोड्या नंतरच्या काळात पुरलेल्या प्रेतांचे पाय पोटाशी दुमडून घेतलेले आहेत. यांत आईच्या पोटात मूल याच अवस्थेत असते, हे प्रामुख्याने दाखवावयाचे असून पुनर्जन्माची प्रतीक्षा करणारा हा जीव भूमातेच्या पोटात त्याच अवस्थेत पुरण्यात येत असे. गुहेच्या जमिनीत किंवा क्वचित झोपड्यांच्या जमिनीखाली मृताला पुरण्यात येत असे. यावरून हा मृतात्मा घरादारांचे रक्षण करण्यासाठी तेथे ठेवीत, असा निष्कर्ष काही तज्ञ काढतात. गणचिन्हासंबंधीही अश्मयुगीन मानवाच्या काही विशिष्ट कल्पना होत्या. एखाद्या प्राण्याच्या अगंच्या काही विशेष शक्तींमुळे वा गुणांमुळे त्याला महत्त्व प्राप्त होऊन तो एकेका गटाचा वा कुलाचा पालक बनत असे आणि त्याची प्रतिकृती ही त्या गटाचा ध्वज किंवा निशाणी समजली जाई. ही निशाणी पतकरताना, त्या प्राण्याचे अतिमानुषी बल आपल्या पाठीशी सतत अभे राहावे, ही कल्पना त्यामागे असावी.

नवाश्मयुगात शिकारीचे महत्त्व ओसरले. साहजिकच त्यात यश मिळविण्यासाठी जादूटोण्याची गरजही आता सरली. तथापि पूर्वीच्या काही समजुती थोड्याफार फरकानिशी पुढे चालूच राहिल्या. त्यांपैकी मातृकामूर्ती नवाश्मयुगीन अवशेषांत फार मोठ्या प्रमाणावर सापडतात. जननक्रियेतील स्त्रीतत्त्वाचे पूजन या स्वरूपात होत राहिले, तसेच आता पुरुष तत्त्वाचेही पूजन सुरू झाले असावे. भूमध्य सागराभोवतीच्या प्रदेशातील कुऱ्हाडपूजा ही लिंगपूजेशी निकट समजली जाते. शिवाय पुरुषतत्त्वाची आराधना कबुतर व वृषभ या रूपांत करण्यात येई. मृतात्म्याची व्यवस्था अधिक बारकाईने करण्यात येऊ लागली. केवळ खड्डा करून त्यात प्रेत गाडण्याऐवजी आता रचनापूर्वक बांधलेली थडगी दिसू लागली. काही भागांत मोठी दगडी थडगी वा शवपेटिका वापरण्यात येऊ लागल्या होत्या. कदाचित डामडौलाचा व वैभवाचा निदर्शक असा हा भाग समजता येईल. बहुतेक थडग्यांतून मातृकामूर्ती ठेवण्यात आलेल्या आहेत. या मूर्ती म्हणजे पूर्वी अभिप्रेत असणाऱ्या पृथ्वीमातेची मूर्त रूपे होत. खास नवाश्मयुगात उत्पन्न झालेला धार्मिक घटक म्हणजे नैसर्गिक शक्तीची (पंचमहाभूतांची) उपासना करणारा घटक होय. यापुढे शेती करू लागणाऱ्या समाजांना वार्षिक ऋतुचक्राची कल्पना यावयास लागलेली दिसते. त्यातूनच शेतीस उपयोगी पडणाऱ्या सूर्य व पाऊस या दोन देवतांची उपासना मूळ धरू लागली असावी. यांची मूर्त स्वरूपात पूजा होण्याऐवजी त्यांच्या स्थित्यंतराचे व गमनागमनाचे प्रसंग सामुदायिक उत्सवरूपाने साजरे होऊ लागले. दुसरीकडे जननतत्त्वाचा आवाका वाढून पूर्वीप्रमाणे माणसे व पशू यांच्या प्रजोत्पादनाबरोबर किंवा त्याहीपेक्षा जास्त महत्त्वाची म्हणून जमिनीची सुपीकता त्यात समाविष्ट झाली. या समजुतींतून निर्माण झालेल्या वेगवेगळ्या देवदेवतांची पूजा-अर्चा व प्रार्थना यांसाठी वर सांगितलेली मंदिरे उभारण्यात आली असावीत.

या सर्व समजुती, उत्सव, कल्पना ह्यांतून उत्तरनवाश्मयुगीनांना त्यांच्या पुराणकथा, दंतकथा-धर्म मिळाला असावा.

अलंकरण, कला इ. : उपजीविका कष्टसाध्य आणि एकूण जीवन अस्थिर असले, तरी मानवाची उपजत सौंदर्यदृष्टी व अभिरुची निरनिराळ्या प्रकाराने व्यक्त झालेली दिसते. त्यांतला सगळ्यांत महत्त्वाचा प्रकार म्हणजे अलंकरण. आपले शरीर सुशोभित करण्याची तीव्र इच्छा मानवाला सतत आहे. यासाठी चित्रविचित्र रंगांचे विलेपन ही सगळ्यात आरंभीची पायरी होय. अश्मयुगातील काही सांगाडेही गेरूने रंगविलेले आहेत. त्यांवरून अश्मयुगीन माणूस अंगाला रंग लावीत असावा, असा कयास करता येतो. दुसरा प्रकार म्हणजे, प्राण्यांची हाडे, दात, नखे किंवा वाळक्या बिया यांना भोके पाडून त्यांच्या माळा करून गळ्यात घालणे हा होता. आंतराश्मयुगीन अवशेषांत असे ताइतासारखे वापरलेले दात व हाडे खूप सापडतात. तिसरा प्रकार म्हणजे रंगीत वा चमकदार दगड घेऊन त्यांचे मणी, लोलक आणि ताईत तयार करणे व त्यांच्या माळा अंगाभोवती गुंडाळणे हा होता. चंद्रकोरीच्या, कुऱ्हाडीच्या किंवा पक्ष्याच्या आकाराचे ताईत सापडतात. पण बहुतेक ताईत हे तोड्याच्याच स्वरूपाचे समजावयास हवेत. नवाश्मयुगात दगडी मणी आणि ताईत यांचे विविध प्रकार पाहावयास मिळतात. अलंकारांकडे इतके लक्ष होते, की वस्त्रप्रावरणाकडे विशेष लक्ष देण्याची अश्मयुगीन माणसाला जरूरच भासली नसावी, इतका पुरावा मिळतो. अश्मयुगातील वस्त्रांचे प्रत्येक्ष अवशेष उपलब्ध नाहीत. माणसाचे पहिले चित्र उत्तरपुराणाश्मयुगातीलच पाहावयास मिळते. या चित्रणातून तो सहसा वस्रहीनच दिसतो. क्वचित काही मूर्तींवर (पूर्व यूरोप) केसाळ असे कपडे दाखविले आहेत. त्यावरून अतिशीत प्रदेशात जनावरांची कातडी लपेटून घेण्यात येत, पण इतरत्र वस्त्रांची जरूर भासत नव्हती. ही वस्त्रे शिवण्यासाठी वा ती बांधून घेण्यासाठी उपयोगी असे भोके पाडण्याचे दगडी टोचे व हाडांची दाभणे अवशेषांत मिळतात. जनावरांच्या केसांचा (लोकरीचा) कपड्यासाठी विणून उपयोग करीत किंवा काय, ते सांगता येत नाही.

गवताचे व अंबाडीसारख्या वनस्पतीचे धागे एकत्र विणून दोर तयार करीत. या दोरांचा उपयोग धन्युष्यांसाठी किंवा मासेमारीची जाळी विवण्यासाठी होत असे. सूत कातण्यास आरंभ नवाश्मयुगातच झाला. अवशेषांत चातीची, मातीची वा दगडी चाके मिळाली आहेत. तसेच मातीवर उमटलेले कापडाचे ठसे पॅलेस्टाइन व ईजिप्त येथील काही अवशेषांत मिळाले आहेत. इतरत्र अद्यापही चामड्याचेच कपडे वापरात असावेत. या अवशेषांतील मृत्पात्रांवर घागरा व जाकीट किंवा उपवस्त्र अशी दोन वस्त्रे काढलेली आढळतात. त्यांना गुंड्याही लावल्या आहेत. विणकाम व शिवण यांविषयीची अधिक माहिती नाही.

या प्रदीर्घ काळातील चित्रकला व मूर्तिकला यांचे अनेक नमुने आज उपलब्ध आहेत. यूरोप, आफ्रिका व आशिया हा तिन्ही खंडांत ते सापडतात. यांपैकी यूरोपात व आफ्रिकेत पूर्वपुराणाश्मयुगापासून थेट नवाश्मयुगापर्यंतच्या कलाकृती आहेत, तर आशियात सामान्यपणे आंतराश्मयुगीन कलाच दिसते. खुद्द नवाश्मयुगातील कलाकृतींचे प्रकार व त्यांची परंपरा पूर्णत्वे भिन्न आहे. पूर्वपुराणाश्मयुगातील चित्रकलेचे सर्वोत्तम नमुने फ्रान्स व स्पेन देशांतील गुहांतून सापडले आहेत. ही चित्रे गुहांत खूपच खोलवर, अगदी आतल्या भागांत काढलेली आहेत. उत्तरपुराणाश्मयुग व आंतराश्मयुग यांतील चित्रे जवळपास उघड्यावर असणाऱ्या दरडी व प्रस्तर यांवरच काढली आहेत. चित्रांच्या बाह्याकृती टोकदार दगडाने कोरून, पृष्ठभागावर उमटविलेल्या आहेत. यानंतर या आकृतींवर कुंचले किंवा फवारे यांनी रंग भरलेले आहेत. कुंचले बांबूच्या पट्ट्या किंवा काठ्यांची टोके ठेचून तयार कलेले असावेत. बहुतेक रंग नैसर्गिक रीत्या मिळतात तसेच वापरलेले आहेत. त्यांत मिश्रणाने बदल करण्याचा यत्न केलेला दिसत नाही. रंग देताना वर्ण्यविषयांनी अनुरूप असे स्वाभाविक रंग दिलेले आहेत. कित्येक वेळा रंग देण्याआधी खोदकाम करून आकृतीला उठाव देण्याचा प्रयत्न केलेला आहे. क्वचित माती थापून त्यातून उठावाची चित्रे केली आहेत. भोवताली वावरणारे गवे, रानरेडे, हरिणे, घोडे अशांसारखे प्राणी, प्राण्यांच्या शिकारींचे प्रसंग, नाच करणारे स्त्रीपुरुष, धार्मिक विधी करणारा पुरोहित हे प्रमुख चित्रविषय होत. स्पेनमधील काही गुहांतून वर्तुळे, चौकटी व तजन्य भौमितिक आकृत्या रेखाटल्या आहेत. उत्तरपुराणाश्मयुग आणि आंतराश्मयुग यांमध्ये रंगीत चित्रांऐवजी दगडाचा पृष्ठभाग खरवडून किंवा टाकी लावण्यासारखा ठोकून बाह्यकृती उमटविण्यात येत असे. अशा चित्रांना बहुधा रंग दिलेला नाही. मूर्तिकलेचे नमुने उत्तरपुराणाश्मयुगीनच आहेत. त्यांत हाडे, शिंगे व दगड यांवरील कोरीव कामाचा समावेश करता येतो. भालाफेकी काठ्या, पुरोहिताच्या हातातील दंड, यांवर अत्यंत वास्तवपूर्ण उत्थित शिल्पे खोदली आहेत. जनावरांच्या डोक्याच्या आकाराचे हाडांचे काही ताईतही मिळाले आहेत. दगडी कामांत स्त्रीमूर्ती मुख्य असून त्या अर्धाकृतीच्या व पूर्णाकृतीच्या स्वरूपांत आहेत. स्थूल शरीराच्या या मूर्तीचे नितंब, स्तन व जघनप्रदेश विस्तृत दाखविले आहेत. स्त्रीच्या जननकार्याकडे लक्ष वेधविण्याचा कलाकाराचा प्रमुख हेतू असावा. म्हणून यांना सामान्यपणे ‘स्त्रीमूर्ती’ म्हणत असले, तरी ‘मातृकामूर्ती’ म्हणणे जास्त सयुक्तिक ठरेल. नवाश्मयुगातील अवशेषांत चित्रकलेचे नमुने नाहीत. या कालखंडाच्या उत्तरार्धात मृत्पात्रांवर काढण्यात आलेल्या नक्षीत वेलपत्त्या, पशुपक्षी, भौमितिक आकृत्या अशा विविध आकृत्या असल्या, तरी या कामाचा चित्रकलेत समावेश करणे योग्य ठरणार नाही. मातीच्या भाजून केलेल्या आणि हाडाच्या मूर्ती, यांतील प्राणिमूर्ती व स्त्रीमूर्ती विशेष चांगल्या प्रकारे केलेल्या आहेत. यांतील स्त्रीमूर्ती मातृका-परंपरेतीलच आहेत. पूर्वीप्रमाणे या मूर्तीचे डोकेही केवळ एका गोळ्याने दाखवितात आणि नाकडोळेही कोरलेले नसतात.

पूर्वपुराणाश्मयुगातील कलाकृती म्हणजे आपल्या भोवताली दिसणार्‍या वस्तूंची केवळ नक्कल व प्रतिकृती नव्हे त्यांत निरनिराळे प्रसंग व परिस्थिती कल्पिली आहे. माणसाच्या प्रतिभाविलासाचा हा सर्वप्राचीन आविष्कार होय. विशेषत: गुहेतील चित्रकाम या दृष्टीने अत्यंत लक्षणीय समजावे लागते. मानवी बुद्धी व मन यांची एक वेगळीच झेप त्यांतून प्रतीत होते. परंतु या सगळ्या कलाकृती सौंदर्यनिर्मितीच्या उद्देशाने तयार करण्यात आल्या नाहीत हे निश्चित. त्यांत काही धार्मिक समजुती व कल्पना अंतर्भूत असाव्यात. किंबहुना पुराणाश्मयुगकालीन धार्मिक कल्पना आणि समजुती यांच्या माहितीचे मुख्य साधन म्हणजेच तत्कालीन चित्रकला होय [→प्रागैतिहासिक कला].

अश्मयुग, भारतातील: भारतात आजतागायत झालेले उत्खनन व संशोधन अश्मयुगातील कोणत्याच अवस्थेतील मानवाच्या जीविताचे स्पष्ट चित्र डोळ्यासमोर उभे करू शकत नाही. त्यातल्या त्यात नवाश्मयुगीन जीवनाविषयी थोडीशी तरी माहिती हाती येते पण इतर युगांतील मानव, त्याची वस्ती, त्याच्या भोवतालची सृष्टी, यांच्याविषयी जी कल्पना येते, ती फारच अंधुक व अस्पष्ट आहे. याचे साधे कारण असे, की अश्मयुगीन मानवाच्या जीवनावर प्रकाश पाडणारे जे अवशेष मिळाले आहेत, ते तुरळक व फुटकळ स्वरूपाचे आहेत. त्यांवरून त्याची जीवनपद्धती लक्षात येऊ शकत नाही व एकूण जागतिक अश्मयुगीन मानवी संस्कृतीशी असणारे त्याचे नातेही उलगडू शकत नाही. जे काही निष्कर्ष काढण्यात आलेले आहेत, ते फक्त दगडी आयुधे व उपकरणे यांच्या वर्गीकरणांतूनच. निरनिराळ्या वर्गांची यूरोपीय व आफ्रिकी वर्गांशी तुलना करून सांस्कृतिक टप्पे व कालक्रम यांविषयी विवेचन करण्यात आलेले आहे. या अवस्थांचा भूस्तरीय घडामोडींशीही कसा संबंध लावता येईल, या प्रश्नाचाही नीट निर्णय लागलेला नाही. या मर्यादा ध्यानात ठेवूनच भारतातील अश्मयुगासंबंधीच्या माहितीची नोंद घेतली जावी.

भारतीय अश्मयुगाचे चार खंड पाडण्यात येतात–पूर्वाश्मयुग, मध्याश्मयुग (कार्बन कालनिर्णयानुसार हा काळ ४०,००० वर्षांपूर्वीचा आहे, हे आता सिद्ध झाले आहे), उत्तराश्मयुग, आणि नवाश्मयुग यांतील नवाश्मयुगीन जीवनाचे स्वरूप जगाच्या इतर भागातील नवाश्मयुगातल्यासारखेच आहे. त्यापूर्वीच्या तीन कालखंडांतील सांस्कृतिक स्थिती, तदर्थक यूरोपीय संज्ञांत जे अभिप्रेत आहे तशी दिसत नाही. त्या अर्थाने उत्तरपुराणाश्मयुगाचा तर भारतात आढळही होत नाही. परंतु सांस्कृतिक अवस्था स्पष्ट करण्याच्या दृष्टीने सामान्यपणे भारतातील पूर्वाश्मयुग = यूरोपातील पूर्वपुराणाश्मयुग भारतातील मध्याश्मयुग = यूरोपातील मध्यपुराणाश्मयुग आणि भारतातील उत्तराश्मयुग = यूरोपातील उत्तरपुराणाश्मयुग अशी समीकरणे मांडता येतील.

पूर्वाश्मयुगातील आयुधांचे दोन स्पष्ट गट पडतात. एक गट वायव्य भारत व काश्मीर या भागापुरता असून, दुसरा भारताचा इतर प्रदेश, मुख्यत: आंध्र-तमिळनाडू इ. भागांत पसरला आहे. पहिल्या गटातील हत्यारे गोटे व मोठाली छिलके यांची बनविलेली आहेत. गोलसर बाजू पंजात पकडून खालच्या, सरळ धारेच्या बाजूने वस्तूंचे तुकडे पाडणे, हे या हत्यारांचे मुख्य काम होते. त्यांना चॉपर म्हणतात. पहिल्या गटात असे चॉपर व तत्सम प्रकार आढळतात. दुसऱ्या गटात, मुख्यत्वे छिलके व कपच्या दोन्ही बाजूंनी घडवून तयार केलेली बदामी आकाराची हातकुऱ्हाड हे मुख्य आयुध आहे. हे दोन्ही गट भौगोलिक दृष्ट्या अलग असले, तरी कालदृष्ट्या निकट आहेत–प्राय: समकालीनच असावेत. द्वितीय हिमयुगाच्या शेवटापासून येथे दोन्ही प्रकारची हत्यारे घडविण्यात आली. तृतीय हिमयुगात या संस्कृतीचा विस्तार व तंत्रज्ञान यांचा परमोत्कर्ष झाला पण या युगातील मानवाच्या शरीराचे कोणतेही अवशेष मिळालेले नाहीत.

कोकणपट्टीसारखे एका बाजूचे प्रदेश सोडले, तर भारताच्या बहुतेक सर्व भागांत मध्याश्मयुगीन आयुधे मिळाली आहेत. ही आयुधे चर्ट, जास्पर अशांसारख्या टणक व एकसंध दगडांपासून बनविलेली असून पूर्वाश्मयुगीन आयुधांपेक्षा खूपच लहान आहेत. यांत हरतऱ्हेच्या तासण्या, भोके पाडण्यास उपयुक्त अशी चोच असणारी हत्यारे बऱ्याच संख्येने सापडतात. कातडी कापण्यास व शिवण्यास त्यांचा उपयोग होत असावा. त्यांबरोबर छोट्या हातकुऱ्हाडीही आढळतात. वरील दगडांची छिलके व क्वचित पातीही दिसतात. मध्य-अभिनूतन काळाच्या शेवटच्या सहस्त्रकांपासून तो नूतनतम काळाच्या आरंभापर्यंत या युगाचे अस्तित्व होते. या काळी हवामान फारसे आर्द्र नसून घनदाट अशी जंगलेही फारशी पसरली नव्हती. या वेळच्या मानवाच्या शरीराचे अवशेष उपलब्ध नाहीत. आतापर्यंत रानटी बैल व भीमगज यांची हाडे सापडली आहेत.

मध्याश्मयुगाचा काळ ४०,००० वर्षांपूर्वीचा आहे, हे आता कार्बन कालनिर्णयानुसार सिद्ध झाले आहे. उत्तराश्मयुगाचा आरंभ नूतनतम काळाच्या आरंभी (इ.स.पू. १०,०००) झाला. काही भागांत तो इ.स.पू. ७,००० इतका नजीकचाही असू शकेल. मध्य व उत्तर भारताच्या काही भागांत असणारे घनदाट जंगलांचे प्रदेश सोडल्यास, इतरत्र मानवाची वस्ती उघड्यावर नदीकाठाने होती. पण या दोन जंगलांच्या प्रदेशांत मात्र मानवी वस्ती प्रस्तरालये व गुहा यांतच होती. या प्रस्तरालयांतील चित्रकामही उत्तराश्मयुगीनच असण्याचा संभव आहे. या युगातील आयुधे, लघुअश्मास्त्रे याच सदरात जमा होतात व यांत मुख्यत्वे गारेच्या दगडाची किंचित लांबटशी पाती आहेत. त्यांपासून चाकूची पाती, चंद्रकोरी, टोचे ही आयुधे तयार करण्यात येत. ती आयुधे हाडे व काठ्या यांजबरोबर वापरण्यात येणारी, म्हणजे संयुक्त आयुधे होत. ⇨ लांघणज या गुजरातमधील ठिकाणाखेरीज अन्यत्र उत्तराश्मयुगीन स्थायिक वसाहतींचे अवशेष उपलब्ध नाहीत. शिकार, मच्छीमारी व प्राथमिक स्वरूपाची शेती हीच या काळातील उपजीविकेची मुख्य साधने होत. मृत्पात्रांचा वापरही सुरू झाला असावा. लांघणज याच ठिकाणी काही मानवी सांगाडे सापडले असून ते मिश्र वंशाचे आहेत. हातपाय पोटाशी ठेवून हे सांगाडे थडग्यांत पुरण्यात आले होते. या भागात पाणघोडे, अस्वले, हरणे, सांबरे, रानगाई असे प्राणी वावरत असत.

भारतातील नवाश्मयुग आणि ताम्रपाषाणयुग ही दोन्ही साधारण समकालीनच आहेत. नवाश्मयुगीन म्हणून ओळखल्या जाणाऱ्या अवशेषांतही तांब्याच्या वस्तू सापडतात. ताम्रपाषाणयुगीन समाजही नवाश्मयुगीनांप्रमाणेच शेतकी, पशुपालन यांवरच जगत असे. म्हणून या दोन स्वतंत्र अवस्था समजाव्यात किंवा कसे, यावर तज्ञांत एकमत नाही. तथापि घासून गुळगुळीत केलेल्या दगडी कुऱ्हाडी वा छिन्न्या यांसारखे आयुधप्रकार आणि इतर ठिकाणच्या नवाश्मयुगीनांशी असणारी साम्ये ध्यानात घेऊनच काही समाजांना नवाश्मयुगीन तर काहींना ताम्रपाषाणयुगीन संबोधण्यात येते. भारतातील ताम्रपाषाणयुगाचे तीन पृथक भाग पडतात. एक उत्तर व वायव्य भारतातील, दुसरा पूर्व भारतातील व तिसरा दक्षिण भारतातील. या सर्व संस्कृतीचा काळ इ.स.पू. दुसरे सहस्रक व त्याच्या थोडा पुढे मागे असा आहे. याला अपवाद फक्त बलुचिस्तानच्या सरहद्दीनजीकच्या ⇨कुल्ली, झॉब या संस्कृतींचा असून त्या संस्कृती इ.स.पू. चौथ्या सहस्रकातील आहेत. परंतु भारतातील इतर समाजांशी त्यांचा सलग संबंध अद्याप प्रस्थापित झालेला नसल्याने व पश्चिम आशियातील नवाश्मयुगीन संस्कृतींशी त्यांचा जास्त निकटचा संबंध स्पष्टपणे दिसत असल्याने, त्यांना त्या क्षेत्रातील संस्कृतीच्या शाखा समजणे अधिक उचित ठरेल.

उत्तर भारताच्या वैशिष्ट्यपूर्ण अशा नवाश्मयुगीन संस्कृतीचा आढळ प्रामुख्याने काश्मीरमध्ये झेलमच्या खोऱ्यात झाला आहे. बूर्झाहोम येथील उत्खननांत गवसलेल्या अवशेषांवरून या समाजाच्या जीवनविकासाचे दोन टप्पे दिसतात. पहिल्यात, जमिनीत मोठाले खड्डे करून त्यांत वस्ती करण्यात येई. हे खड्डे सामान्यपणे तीन मी. व्यासाचे असून त्यांची खोली दीड ते चार मी. होती. यावर फांद्या व गवत यांचे छप्पर असावे. घासून धार लावलेली दगडी हत्यारे, हाडांचे टोचे, दाभण, राप्या व हातघडणीची मृत्पात्रे ही येथील सांस्कृतिक वैशिष्ट्ये होत. दुसऱ्या टप्प्यात, कच्च्या विटांची घरे बांधण्यात येऊ लागली. मृत्पात्रे घडविण्यासाठी चाकाचा वापर सुरू झाला. क्वचित तांब्याची हत्यारे सापडतात पण धातूच्या उपयोगाचे ज्ञान अगदी प्राथमिक स्वरूपाचे असावे. बी पेरण्याकरिता जमिनीत खळगे करण्यासाठी अणकुचीदार काठ्या वापरीत व त्या जोराने जमिनीत घुसाव्यात म्हणून त्यांभोवती दगडी कडी बसवीत. अशी वजने व दगडाचे विळ्यासारखे हत्यार सापडले आहे. यांवरून शेती करण्यात येई असा निष्कर्ष निघत असला, तरी हाडाच्या हत्यारांचे जे विविध प्रकार दिसतात त्यांवरून शिकारीलाच प्राधान्य असावे, असे दिसते. या काळातील काही थडग्यांत माणसांबरोबर कुत्रीही गाडलेली दिसतात. थडग्यातील सांगाड्यांवरून तेथील माणसांच्या वंशांची कल्पना येत नाही. जमिनीत खड्डे करून राहण्याची पद्धत व दगडी विळे यांवरून उत्तर भारतातील ही संस्कृती तत्कालीन चिनी नवाश्मयुगीन संस्कृतीशी संबद्ध असावी, असे मानता येते.

दुसरे क्षेत्र म्हणजे, ओरिसा, बिहार, आसाम या क्षेत्रांतील नवाश्मयुगीन संस्कृतीचे पूर्वक्षेत्र. गोल बुडाच्या दगडी कुऱ्हाडी, छिन्न्या व मुख्यत: चौकोनी खांद्यांच्या दगडी कुऱ्हाडी ही येथे सापडणारी वैशिष्ट्यपूर्ण आयुधे होत. या क्षेत्रातील निरनिराळ्या ठिकाणची मृत्पात्रे भिन्न प्रकारांची आहेत. येथे झालेले संशोधन पूर्ण कल्पना देण्यास पुरेसे नसले, तरी त्यातील विशिष्ट आयुधांवरून या संस्कृतीचा अन्यत्र जोडता येतो.

तिसरे क्षेत्र दक्षिण भारतातील नवाश्मयुगीन संस्कृतीचे. हे क्षेत्र उत्तर कर्नाटक व वायव्य आंध्र प्रदेश यांचे मिळून होणारे असून येथे मोठ्या प्रमाणावर उत्खनने करण्यात आली आहेत. त्यांपैकी ⇨ ब्रह्मगिरी, पिकलीहाल, टेक्कलकोटा ही महत्त्वाची होत. तेथे गोल वा चौकोनी आकाराच्या कुडाच्या घरांतून मानवी वस्ती होती. क्वचित वस्तीसाठी उंच अशा टेकड्यांवरील सपाट भागांचा उपयोग केलेला दिसतो. पहिल्या कालखंडात हातघडणीची राखी मृत्पात्रे वापरीत. दुसऱ्या कालखंडातील मृत्पात्रे तांबूस काळसर रंगाची आहेत. कोठेकोठे रंगीत नक्षीकाम केलेली मृत्पात्रेही या कालखंडात वापरलेली दिसतात. घासून गुळगुळीत केलेल्या कुर्‍हाडी, छिन्न्या यांसारख्या हत्यारांबरोबर दगडी पात्यांचा उपयोग मोठ्या प्रमाणावर करण्यात येत असे. दफनाची पद्धती अस्तित्वात असून मृताशेजारी त्याची आयुधे व भांडीही ठेवलेली आढळतात. या नवाश्मयुगीन संस्कृतीचा संबंध इतर भागांतील तत्सम संस्कृतींशी जोडण्याइतका प्रत्यक्ष पुरावा हाती नसला, तरी काही वैशिष्ट्यपूर्ण वस्तूंवरून, वर उल्लेखिलेल्या वायव्य भारतातील संस्कृतीप्रमाणेच ह्याचाही संबंध पश्चिम आशियातील नवाश्मयुगीनांशी असावा असे दिसते. तथापि निश्चित संबंध जोडता आलेले नाहीत, हे मान्यच करावयास हवे. वरील तिन्ही क्षेत्रांत पशुपालन व शेतकी हीच उपजीवविकेची प्रमुख साधने होती.

पहा : प्रागितिहास मृत्पात्रे मानववंश पुरावत्त्वीय उत्खनने.

संदर्भ : 1. Childe, Gordon, New Light on the Most Ancient East, London, 1958. 2. Clark, Grahame, World Prehistory–An Outline, Cambridge, 1961. 3. Clark,Grahame Piggott, Stuart, Prehistoric Societies, London, 1965. 4. Day, Michael M. Guide to Fossil Man, London, 1965. 5. Jacquetta, Hawkes Wooly, Leonard, Prehistory and the Beginnings of Civilization History of Mankind, Vol.1, London, 1963. 6. Leakey, L. S. B. Adam’s Ancestors, London, 1960. 7. Mate, M. S. Misra, V. N.Indian Prehistory, Poona, 1964, 1965. 8.Piggott, Stuart, Ed. The Dawn of Civilization, London, 1961. 9. Sankalia, H. D. Prehistory and Protohistory of India and Pakistan, Bambay, 1963. 10. Sankalia, H. D. Stone Age Tools, Poona, 1964. 11. Semenov, S. A. Trans. Thompson, M. W. Prehistoric Technology, London, 1964. 12. Singer, C.History of Technology, Vol. I, Oxford, 1954. 13. Stern Philip Van Doren, Prehistoric Europe, London, 1970.

देव, शां. भा. ढवळीकर, म. के.

 

thepostman.co.in

नगरच्या या नदीकाठी अश्मयुगीन मानव राहत असल्याचे पुरावे सापडलेत


आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक, युट्युब


मनुष्याच्या जीवनातील प्रत्येक गोष्ट ही इतिहासाशी निगडीत असते. मात्र हे पण हे लक्षात घ्यायला हवे की इतिहास म्हणजे काही नुसत्या सनावळ्या आणि लढायांची जंत्री नाही. या इतिहासाला देखील एक इतिहास होता, तो म्हणजे मानवी संस्कृतीच्या विकासाचा. मानवी वस्त्यांचे अवशेष आपल्याला संपूर्ण मानव जातीचा इतिहास आणि संस्कृती सांगत असतो.

आपल्याला आजकालच्या शाळेमध्ये विशेषतः इयत्ता ३ री च्या पुस्तकामध्ये अश्मयुगीन माणसाची माहिती दिलेली आढळते. मुले अभ्यासामध्ये अश्मयुग, नवअश्मयुग, ताम्रपाषाणयुग वगैरे शब्द पाठ करतात दगडाच्या कुऱ्हाडीची, रापींची, चित्रे पुस्तकात पाहतात. परंतु पुस्तकातील दगडी ह*त्यारांची केवळ चित्रे न बघता प्रत्यक्ष दगडी कुऱ्हाड जर पाहिली तर त्या शाळेतील मुलांना प्राचीन मानवी इतिहासाबद्दल माहिती समजायला फक्त मदतच होत नाही तर त्याबद्दल जिज्ञासा देखील निर्माण होते. तसेच जर या विद्यार्थ्यांना एखाद्या कोरड्या नदीच्या पात्रात अभ्यासाला नेले तर या विद्यार्थ्यांना देखील प्राचीन मानवी वसाहतीचे पुरावे पाहायला मिळतील आणि प्राचीन मानवाच्या वस्तीची स्थाने कशी पाहतात हे कसे ओळखायचे याबाबत नक्की माहिती मिळेल.

अशाच प्राचीन मानवाच्या नदीपात्रातील वस्तींची माहिती घ्यायची असेल तर महाराष्ट्रातील नद्यांचे महत्त्व किती आहे याबाबत जाणून घेणे फार महत्वाचे ठरेल.

प्राचीन मानवी संस्कृतीच्या खुणा दर्शवणारा माठ यावरील प्राचीन मानवाने केले रंगकाम दिसून येते.

महाराष्ट्राची भौगोलिक रचना जर पहिली तर तिचे मानवाच्या संस्कृतीच्या विकासामध्ये योगदान आपल्याला दिसून येते. मानवी शरीरात जशा धमन्या रक्त पुरविण्याचे काम करतात त्याच प्रकारे महाराष्ट्रातील नद्या महाराष्ट्राचे पोषण करतात. महाराष्ट्रातील नद्यांचे योगदान मानवाच्या विकासासाठी फार मोठे कारण आहे.

याच नद्यांच्या काठावर मानवी संस्कृती स्थिर झाली आणि याच महाराष्ट्रातील नद्यांच्या काठाला लहान मोठी नगरे उभी राहिली. ऋग्वेदामध्ये सिंधू, सरस्वती यांसारख्या नद्यांना देवता मानून त्यांचे स्तवन केलेले आपल्याला आढळते.

मानवी संस्कृतीचा अभ्यास करायचा असेल तर या नद्यांचा देखील अभ्यास करणे फार महत्त्वाचे ठरते तसेच त्या नदीकाठी वसलेल्या किंवा विकसित झालेल्या वसाहतींचा अभ्यास करणे हे देखील महत्त्वाचे असते.

आजपर्यंत मानवी संस्कृतीचा अभ्यास करताना बरीचशी ठिकाणे ही पुरातत्वीय अभ्यासकांना महाराष्ट्रातील विविध ठिकाणी सापडली आहेत त्यातील बहुतांश ठिकाणे नदीकाठी सापडलेली आहेत. भारतामधील नदीच्या काठी वसलेल्या संस्कृतीची उत्तम उदाहरणे म्हणजे प्राचीन सरस्वती नदीकाठी वसलेले कालीबंगन येथे ‘घग्गर’ संस्कृतीचे अवशेष सापडलेले आपल्याला बघायला मिळतात.

आपल्या महाराष्ट्रामध्ये शिरूरजवळ असणाऱ्या ‘इनामगाव’ येथील घोडनदीच्या काठावर झालेल्या उत्खननात ‘माळवा संस्कृती’, ‘पुर्वजोर्वे संस्कृती’ अशा ताम्रपाषाणयुगीन संस्कृतीमधील विविध स्तर उत्खननात सापडले. महाराष्ट्रातील प्रवरा ही एक अत्यंत महत्त्वाची नदी. याच प्रवरा नदीच्या खोऱ्यामध्ये नेवासा, दायमाबाद तसेच जोर्वे येथे अश्मयुगीन आणि ताम्रपाषाणयुगीन वसाहतीचे पुरावे उत्खननातून मिळाले. हे उत्खनन प्राचीन मानवी वसाहती महाराष्ट्रात होत्या याचे फार मोठे पुरावे उपलब्ध करून देते.

प्राचीन मानवाचा पुनर्जन्मावर फार विश्वास होता हे वरील दोन माठांच्यावरून दिसून येते या वरील माठांमध्ये मृत झालेल्या व्यक्तींचे शरीर ठेवून पुरत असत.

प्रवरा नदी नगर जिल्ह्याची जीवनदायिनी. अनेक छोटीमोठी गावे या प्रवरा नदीच्या काठावर वसलेली आहेत. मुळात नगर जिल्ह्याचे वैशिष्ट्य असे आहे की गोदावरीच्या खोऱ्यामधील प्रवरा नदी आणि कृष्णा खोऱ्यामध्ये असणारी सीना नदी या दोन्ही नद्या या एकाच जिल्ह्यातून वाहतात.

या नद्यांच्या काठी मानवी संस्कृती वसत गेली आणि मानवाचा विकास होत गेला हे आपल्याला या नद्यांच्या काठावर आढळणाऱ्या मानवी वसाहतींच्या अवशेषांवरून समजते. प्रागैतिहासिक काळापासून या संपूर्ण खोऱ्यामध्ये विविध संस्कृती नांदल्या आणि विविध मानवी संस्कृती या महाराष्ट्रात उदयाला आल्या असे आपल्याला दिसते.

अश्मयुगात माणूस भटक्या अवस्थेत होता. त्या काळामध्ये माणूस पाण्याच्या आश्रयाने राहत असे आणि आपल्या आजूबाजूला उपलब्ध असलेल्या दगडांची तो ह*त्यारे करीत असे, जुनी झालेली ह*त्यारे तेथेच टाकून तो स्थलांतर करत असे. या टाकलेल्या ह*त्यारांवर पावसाळ्यात नदी आपला गाळ जो वाहून आणते त्याचा थर या ह*त्यारांवर बसायला लागला की ही ह*त्यारे नदीपात्रातील मातीमध्ये बुजून जातात. जसजसा नदीचा गाळ कालांतराने वाहून जातो किंवा नदीपात्र हे शुष्क बनते तसे हे लपले गेलेले ह*त्यारे आणि प्राचीन मानवी वसाहतीच्या जागा दिसू लागतात.

प्राचीन मानवी वसाहतीच्या जागा या बऱ्याचश्या गावांमध्ये ‘पांढरी किंवा पांढर’ या नावाने प्रसिद्ध असतात. या पांढरी बऱ्याचदा नदीपात्रालगत असतात आणि या पांढरीचा थर मात्र नेहमीच्या मातीपेक्षा खूप वेगळा असतो. या पांढरीच्या टेकडामुळे बऱ्याचदा आपल्याला प्राचीन मानवी संस्कृतीचे धागेदोरे सापडायला मदत होते.

प्राचीन माणसाने तयार केलेल्या भांड्याच्या विविध वस्तू.

प्राचीन मानवी संस्कृतीचे धागे दोरे सापडण्यात जशी प्राचीन मानवी ह*त्यारे मदत करतात तसेच मातीची खापरे देखील फार महत्वाची ठरतात. इतर धातूची भांडी ही कालौघात नष्ट होतात परंतु मातीची भांडी आणि त्यांची खापरे वर्षानुवर्षे तशीच राहतात. म्हणून या मातीच्या खापरांना आत्यंतिक महत्त्व आहे.

या मातीच्या खापारांवरून आपल्याला प्राचीन मानवी वसाहतींचा काळ निश्चित करता येतो.

या विविध मानवी संस्कृती या महाराष्ट्रातील नदीकाठी नांदत होत्या, त्याचे पुरावे या महाराष्ट्रातल्या नद्या आपल्याला देतात आणि मानवी संस्कृतीच्या विकासाच्या पाऊलखुणा या आपल्याला धुंडाळणे फार महत्त्वाचे ठरते, कारण यातून आपल्याला प्रागैतिहासिक मानवाची प्रगती समजते आणि नदीकाठच्या प्राचीन संस्कृतीतून आजच्या मानवाच्या प्रगतीची झलक दिसून येते.

महाराष्ट्रात ज्या मोठ्या प्राचीन संस्कृती आढळल्या आहेत त्यांची नावे.   (नकाशा आंतरजालावरून घेतला आहे.)

सदर लेख महाराष्ट्राची शोधयात्रा वर  पूर्वप्रकाशित.

संदर्भपुस्तके:-

  1. पुरातत्वविद्या:- श्री. शां.भा.देव,१९७९
  2. महाराष्ट्रातील पुरातत्व:- श्री. ह.ध. सांकलिया आणि म.श्री. माटे महाराष्ट्र राज्य सांस्कृतिक मंडळ, १९७६

छायाचित्रे:-

  1. महाराष्ट्रातील प्रागैतिहासिक मानवाच्या वस्तीची स्थळे.
  2. डेक्कन कॉलेज फिल्ड व्हीजीट दरम्यान घेतलेली छायचित्र आहेत
 
marathi.indiatimes.com

शिलावर्तुळांचे गूढ


ताम्रपाषाण युगानंतर लोखंडाचा शोध लागल्याने शेतीची प्रगती झाली. लोखंडी हत्याराने जंगल तोडून शेतीसाठी जमीन तयार करणे सोपे झाले. याच काळी दफनाकरिता मोठ्या पाषाणखंडाचा उपयोग करण्यात येऊ लागला, म्हणून या काळाला लोहयुग किंवा बृहदाश्मयुग किंवा लोह-बृहदाश्मयुग हे नाव देण्यात येते. या संस्कृतीचे विपुल पुरावे विदर्भात सापडले असून, काही स्थळांचे संशोधन व्हायचे आहे.

 

जुनापाणी, नागपूर येथे आढळले 300 हून अधिक स्टोन सर्कल (शिलावर्तुळ)
विदर्भातील नागपूर शहरालगत असलेल्या जुनापानी शहरामध्ये प्रागैतिहासिक काळात येथे बांधल्या गेलेल्या मेगालिथिक शिळावर्तुळे (मोठ्या दगडांची वर्तुळ) आहेत. असे 300 शिळावर्तुळे सापडली आहेत. सन 1879 मध्ये, इतिहासकार जे. एच. रेव्हेट-कर्नाक यांनी येथे उत्खनन केले आणि त्यांचा शोध लावला. या शिलालेखांमध्ये लोखंडी खंजीर, कुर्हाडी, फावडे, ब्रेसलेट, अंगठी, तीक्ष्ण साधने आणि चिमटा (जे कधीकधी लाकडी दगडांनी ठेवलेले होते) आढळले आहेत. लाल आणि काळ्या मातीचे तुकडे देखील येथे सापडले आहेत, त्यातील काही काळ्या रंगात डिझाइन केलेले आहेत. लोकांना काही ठिकाणी पुरण्यात आले आहे आणि तेथे केर्न्स आहेत (दगडांचे पद्धतशीर ढीग).
इतिहासकारांच्या म्हणण्यानुसार हे शिलावर्तुळ १००० ईसापूर्व तयार केले गेले असावेत. काही दगडांवर कपमार्क्स असतात आणि ते दिशानिर्देशांनुसार उभे केले गेले आहेत, यामुळे त्यांचा वापर खगोलशास्त्राशी संबंधित असावा अशी शक्यता निर्माण होते. जरी अनेक खडक पाषाण युगात बनले असले तरी त्यांच्या निर्मितीच्या वयानुसार हे खडक लोह युगात बनले होते.
 

 

नागपूर जिल्ह्यात अडीच ते तीन हजार वर्षांपूर्वीचे महापाषाण संस्कृतीचे अवशेष आढळले

लोकांना लोखंडाचा उपयोग माहित होता, एवढेच नव्हे तर लोहमृतिकेपासून लोह गाळण्याची कलाही त्यांना अवगत होती

 Updated on: Feb 21, 2023 | 11:36 AM
Share 
नागपूर जिल्ह्यात अडीच ते तीन हजार वर्षांपूर्वीचे महापाषाण संस्कृतीचे अवशेष आढळले आहेत.

नागपूर जिल्ह्यात अडीच ते तीन हजार वर्षांपूर्वीचे महापाषाण संस्कृतीचे अवशेष आढळले आहेत.

1 / 6
नागपूर जिल्ह्यातील बेला गावाजवळ असलेल्या कोहळा गावाच्या शेजारी अवशेष आढळले आहेत.

नागपूर जिल्ह्यातील बेला गावाजवळ असलेल्या कोहळा गावाच्या शेजारी अवशेष आढळले आहेत.

2 / 6
महापाषाण संस्कृतीची शंभरावर शिलावर्तुळ प्रकारचे दफनस्मारके, आणि प्राचीन वसाहत आढळून आली आहे.

महापाषाण संस्कृतीची शंभरावर शिलावर्तुळ प्रकारचे दफनस्मारके, आणि प्राचीन वसाहत आढळून आली आहे.

3 / 6
शिळावर्तुळ ,शिळास्तम्भ,शिळाप्रकोष्ठ, दगडांची रास, शवपेटी अशी या संस्कृतीची विविध प्रकारची दफन स्थाने पूर्व विदर्भात वर्धा आणि वैनगंगा नदीच्या खोऱ्यात मोठ्या संख्येने आढळून आलेली आहेत.

शिळावर्तुळ ,शिळास्तम्भ,शिळाप्रकोष्ठ, दगडांची रास, शवपेटी अशी या संस्कृतीची विविध प्रकारची दफन स्थाने पूर्व विदर्भात वर्धा आणि वैनगंगा नदीच्या खोऱ्यात मोठ्या संख्येने आढळून आलेली आहेत.

4 / 6
महापाषाण संस्कृतीचे लोक हे विदर्भाचे आद्यनिवासी होत, त्यांनीच शेतीची सुरुवात विदर्भात सर्वप्रथम केली.

महापाषाण संस्कृतीचे लोक हे विदर्भाचे आद्यनिवासी होत, त्यांनीच शेतीची सुरुवात विदर्भात सर्वप्रथम केली.

5 / 6
या लोकांना लोखंडाचा उपयोग माहित होता, एवढेच नव्हे तर लोहमृतिकेपासून लोह गाळण्याची कलाही त्यांना अवगत होती. हे यावरुन दिसून येते आहे. ही संपुर्ण माहिती नागपूरचे प्रतिनिधी गजानन उमाटे यांनी पाठवली आहे.

या लोकांना लोखंडाचा उपयोग माहित होता, एवढेच नव्हे तर लोहमृतिकेपासून लोह गाळण्याची कलाही त्यांना अवगत होती. हे यावरुन दिसून येते आहे. ही संपुर्ण माहिती नागपूरचे प्रतिनिधी गजानन उमाटे यांनी पाठवली आहे.

 

 

loksatta.com

तीन हजार वर्षांपूर्वीचे शिलास्तंभ सापडले

लोकसत्ता टीम

संग्रहित लेख, दिनांक 18th Sep 2018 रोजी प्रकाशित

तीन हजार वर्षांपूर्वीचे शिलास्तंभ सापडले

गोंडपिपरी तालुक्यातील डोंगरगाव परिसरात शिलावर्तुळ, शिलास्तंभ आढळून आले आहे.

गोंडपिपरी तालुक्यातील डोंगरगाव परिसरात शिलावर्तुळ, शिलास्तंभ आढळून आले आहे.
गोंडपिपरी तालुक्यातील डोंगरगाव परिसरात शिलावर्तुळ, शिलास्तंभ आढळून आले आहे.

चंद्रपूर : गोंडपिपरी तालुक्यातील डोंगरगाव परिसरात शिलावर्तुळ, शिलास्तंभ आढळून आले आहे. ते तीन हजार वर्षांपूर्वीचे असल्याचा अंदाज इतिहास अभ्यासक नीलेश झाडे यांनी व्यक्त केला.

चंद्रपूर जिल्हय़ातील गोंडपिपरी तालुक्यात मोठय़ा प्रमाणात पुरातत्त्वीय अवशेष सापडले आहेत.  इतिहास  अभ्यासक नीलेश झाडे यांना शोधमोहिमेदरम्यान शिलावर्तुळे डोंगरगाव येथील डोंगराच्या पायथ्याशी आढळून आले, तर याच मार्गावरील चेक दरूर शेतशिवारात राजेश्वर देशमुख यांच्या शेतात शिलावर्तुळ आढळून आले. वर्तुळासाठी तीन दगडांचा वापर करण्यात आला आहे.

संशोधनाची गरज

नागपूरच्या पुरातत्त्व विभागाचे प्रमुख प्रियदर्शी खोब्रागडे यांनी या शिलास्तंभाची पाहणी करून ते तीन हजार वर्षांपूर्वीची असावी याला दुजोरा दिला. परिसरात उत्खनन केल्यास महापाषाण युगातील मानवाची अधिक माहिती जगापुढे येईल. उत्खनन करण्यासाठी जिल्हाधिकारी यांना  भोटून निवेदन देणार असल्याचे झाडे यांनी लोकसत्ताशी बोलताना सांगितले.

 

bbc.com

विदर्भात सापडली हजारो वर्षे जुनी महापाषाणयुगीन एकाश्म स्मारकं - BBC News मराठी


विदर्भात सापडली हजारो वर्षे जुनी महापाषाणयुगीन एकाश्म स्मारकं

डोंगरगाव (ता. नागभीड, जि. चंद्रपूर) येथील बृहदश्मयुगीन शिलास्तंभ

फोटो स्रोत, Rahul Ransubhe/bbc

फोटो कॅप्शन, डोंगरगाव (ता. नागभीड, जि. चंद्रपूर) येथील बृहदश्मयुगीन शिलास्तंभ
    • Author, राहुल रणसुभे
    • Role, बीबीसी मराठी प्रतिनिधी

चंद्रपूरच्या नागभीडमधल्या शिवटेकडीला अमित भगतनं पहिल्यांदा भेट दिली, तेव्हा आपल्या हातून अशा कुठल्या पुरातन स्मारकांचा शोध लागेल असं त्याला वाटलंही नव्हतं.

पण पुढची साडेचार वर्षं अमितनं चंद्रपूर व भंडाऱ्यातील गावं पिंजून काढली आणि शंभरहून अधिक एकाश्म स्मारकं हुडकून काढली. त्यानं जमा केलेल्या माहितीने भारतीय पुरातत्व खात्याला संशोधनाची नवी दिशा दिली आहे.

खरं तर अमित एका सरकारी विमा कंपनीत प्रशासकीय अधिकारी आहे. पण इतिहासाची आवड त्याला स्वस्थ बसू देत नाही. जिथे जाईल तिथे तो ऐतिहासिक स्थळांना भेट देतो. 2014 मध्ये चंद्रपुरात बदली झाल्यावर त्यानं अशीच नागभीडला भेट दिली होती.

अमित सांगतो, "नागभीडच्या शिवटेकडीच्या पायथ्याला काही एकाश्म स्मारकं (Menhirs) आहेत. ती पाहण्यासाठी मी तिथे गेलो आणि यासारखी अजून काही स्मारकं आहेत का? याचा शोध घ्यायला लागलो. इथल्या स्थानिकांना मी याबद्दल विचारल्यावर त्यांनी जंगलात अशी काही स्मारकं असू शकतात असं सांगितले. त्यातील काही लोकांनी दिलेल्या माहितीच्या आधारे मी जंगलामध्ये विविध ठिकाणी फिरलो. तेव्हा मला अशी काही ठिकाणं आढळून आली, जिथे मोठ्या प्रमाणात एकाश्म स्मारकं होती."

महापाषाणयुगात मनुष्याच्या मृत्यूनंतर त्यांची आठवण म्हणून त्या दफनस्थळी लहान मोठ्या दगडांचा खच करून त्यामध्ये एक मोठा दगड उभा केला जायचा, त्यालाच एकाश्म स्मारक किंवा शिलास्तंभ म्हणतात. चंद्रपुर-भंडाऱ्यात सापडलेली एकाश्म स्मारकं ही 1 फुटापासून ते 13 फुट उंचीची आहेत. हे सर्व अखंड शिलास्तंभ आहेत.

 

कोकणात सुमारे १० हजार वर्षांपूर्वी कुणी काढल्या या गूढ आकृत्या? - BBC News मराठी


कोकणात सुमारे १० हजार वर्षांपूर्वी कुणी काढल्या या गूढ आकृत्या?

व्हीडिओ कॅप्शन, पाहा व्हीडिओ : 'कोकणात दहा हजार वर्षांपूर्वी नेमकं काय चाललं होत

पुरातत्वशास्त्रासाठी कोकण सध्या जिव्हाळ्याचा विषय बनला आहे. कोकण त्यांना अनेक जुन्या प्रश्नांच्या उत्तरांसोबत काळाच्या उदरातल्या अनेक नव्या पैलूंवर प्रकाश टाकण्यासाठी मदत करणार आहे. त्याचं कारण आहेत, 'कातळशिल्पं'. किनारपट्टीलगत गेल्या काही वर्षांमध्ये सापडलेली कातळशिल्पं मानवी संस्कृतीच्या प्रवासातले नवे टप्पे समोर घेऊन येणार आहे.

कोकणतल्या रत्नागिरी-राजापूर पट्ट्यात अचानक जमिनीतून वर यावीत तशी ही कातळशिल्पं गेल्या काही वर्षांत समोर आली आहेत. याअगोदर त्यांच्याकडे कोणा पुरातत्वशास्त्रज्ञाचं लक्ष का गेलं नाही हे एक कोडंच आहे. पण काही स्थानिक देवदेवतांचं स्वरूप घेऊन, तर बहुतांश सड्यांवरच्या मातीखाली दबली गेली होती. त्यांची संख्या किती होती याचा कोणालाच अंदाज नव्हता. पण गेल्या चार-पाच वर्षांत शोधकार्य सुरु झाल्यापासून हजाराच्या घरात त्यांचा आकडा पोहोचला आणि पुरातत्वशास्त्रज्ञांची नजर उंचावली गेली

पण मुळात ही कातळशिल्पं आहेत तरी काय? कोकणातल्या सड्यांवर, म्हणजे खडकाळ भूभागांवर, कोरलेली ही चित्रं आहेत. ती अनेक प्रकारची आहेत. त्यात प्राणी आहेत, पक्षी आहेत, मानवी आकृत्या आहेत, भौमितिक रचना आहेत, नुसतेच आकार आहेत. या चित्रांवरून लगेचच समजतं की अप्रगत मानवानं अगदी प्राथमिक टप्प्यात कोरलेली ही चित्रं आहेत. मानवी संस्कृतीच्या विकासाच्या प्रवासात अशा प्रकारची कोरलेली चित्रं जगाच्या अनेक प्रदेशांत सापडतात. काही अभ्यासक त्यांना 'खोदशिल्पं' असंही म्हणतात, तर इंग्रजीमध्ये त्यांना 'पेट्रोग्लिफ्स' असं म्हणतात.

जगभरात आढळणारी कातळशिल्पं वेगवेगळ्या काळातली आहेत. अगदी अश्मयुगातली आहेत, जेव्हा माणसाकडे केवळ दगडी हत्यारं होती. चित्रकलाही अगदी प्राथमिक टप्प्यातली होती. माणसाला शब्दांची भाषा अवगतही नव्हती आणि चित्रांची भाषा तयार होण्याची सुरुवात झाली तेव्हाचीही आहेत. आणि त्यानंतर अनेक टप्प्यांत ती अधिकाधिक प्रगल्भ होत गेलेली, नैसर्गिक रंगांचा उपयोग झालेली, चित्रांच्या भाषांतून त्या काळाची गोष्ट सांगणारीसुद्धा आहेत. रत्नागिरीत सापडणारी चित्रं बघतांनाच समजतं की इथं राहणारा माणूस हा नुकताच त्याच्या अवती भवती असणारा निसर्ग रेखाटायला लागला होता. जे तो पाहत होता, ते नोंद करून ठेवण्याची त्याच्यातली प्रेरणा जन्म घेत होती. पण त्यामुळे पहिला प्रश्न कोणालाही हा पडतो की, नेमक्या कोणत्या काळातली, किती हजार वर्षांपूर्वीची ही चित्रं आहेत? कोणत्या युगामध्ये त्यांचा समावेश होतो?

कोकण, इतिहास, भूगोल, संस्कृती, महाराष्ट्र

मात्र त्याचं नेमकं उत्तर अद्याप पुरातत्वशास्त्रज्ञांकडे नाही. कारण त्यासाठी ज्या दगडी हत्यारांनी ही चित्रं खोदली गेली, ती सापडावी लागतील आणि मग कार्बन डेटिंगनं त्यांचं नेमकं वय समजू शकेल. काही मोजक्या ठिकाणी ही हत्यारं सापडायला सुरुवात झाली आहेत, पण त्यांचा प्रगत अभ्यास नुकताच सुरू झाला आहे. पण या कातळशिल्पांच्या दर्शनी अभ्यासावरून आणि आजवर जगभरात इतर झालेल्या अभ्यासाच्या आधारे कोकणातल्या चित्रांच्या कालखंडाचा कयास करता येतो.

 

सिंधुदुर्गात आढळली हजारो वर्षांपूर्वीच्या गूढ संस्कृतीतील मृतांची स्मारकं - BBC News मराठी


सिंधुदुर्गात आढळली हजारो वर्षांपूर्वीच्या गूढ संस्कृतीतील मृतांची स्मारकं

घुमडे गावात आढळलेले माहापाषाणीय संस्कृतीतले शिळावर्तुळ

फोटो स्रोत, Amit Samant

कोकणवासियांनो आणि पर्यटकांनो, सिंधुदुर्गात मालवणला जाताना, घुमडे या गावाजवळ माळरानावर गोल आकारात रचलेले काही मोठ्या आकारातील दगड पाहिले आहेत का? जर पाहिले असतील, तर लक्षात घ्या ते साधेसुधे दगड नाहीत.

ती गोलाकार मांडलेली 'शिळावर्तुळं' आहेत. ही आहेत उत्तर अश्मयुगातील किंवा महापाषाणीय संस्कृतीतील नागरिकांनी मृत आप्तस्वकीयांच्या स्मरणार्थ उभारलेली स्मारकं.

अशा स्वरुपाची स्मारकं महाराष्ट्रात अडीच हजार वर्षांपूर्वी निर्माण झाली होती. यामुळे कोकणात अश्मयुगाच्या अखेरीस नेमकी कोणती संस्कृती नांदत होती? हा नवा प्रश्न पुरातत्वज्ञांसमोर उभा राहिला आहे.

महाराष्ट्रातल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यांत शिळावर्तुळं आढळली आहेत. या वर्तुळांचं आणि स्मृतीस्मारकांच्या नेमका काळ ठरवण्याचं (डेटींग) काम सध्या सुरू आहे. आतापर्यंत केवळ पुणे, विदर्भ, कर्नाटक इथेच ही स्मारकं आढळली होती.

पुरातत्वज्ञांच्यामते अश्मयुगात अशा प्रकारची शिळास्मारकं उभारण्याची पद्धत रूढ होती. परंतु कोकणात अशी शिळावर्तुळं कधीच आढळली नव्हती.

 







 

lokmat.com

महापाषाण काळातील ‘मेनहीर’ दुर्लक्षितच

लोकमत न्यूज नेटवर्क

कोंढा-कोसरा : वार्ताहर पवनी तालुक्यातील विरली (खंदार) गावात शासकीय जागेत स्मशानभूमीला लागून असलेल्या जागेत १५ ते २० दगडांचे गोलाकार वर्तुळात समाधी आहेत. त्यास मेनहीर (वृतसमाधी) तसेच त्यास शिलावर्तुळ असेदेखील म्हणतात. हे अवशेष महापाषाण काळातील असून, येते अशा शेकडो वृतसमाधी आढळतात. या ठिकाणी भारतीय पुरातत्व विभागाने उत्खनन केल्यास अनेक प्राचीन अवशेष मिळू शकतात. हे अवशेष इतिहास पूर्व काळातील असल्याने यास विशेष महत्त्व प्राप्त होऊ शकते. मात्र महापाषाण काळातील हे ‘मेनहीर’ दुर्लक्षितच आहेत.

मागील वर्षात मार्च २०२० मध्ये येथे कडुलिंब वृक्षाला लागून असलेली बलदेवबाबा यांची पाषाणातील मूर्ती हे एक महापाषाण काळातील अवशेष असल्याचे स्पष्ट झाले. चंबुतऱ्यावर १४ फूट व जमिनीत ७ फूट खोल उत्खनन करून मिळाल्याने हे 'मेनहीर 'संपूर्ण भारतातील सर्वात मोठे असल्याची शक्यता वर्तविली होती, ती खरी ठरली आहे. त्यानंतर लॉकडाऊन सुरू झाल्याने येथील उत्खनन कार्य थांबविण्यात आले. नंतर पुन्हा येथे उत्खनन कार्य केले नाही. महापाषाण काळात मृतदेह पुरण्याची प्रथा होती. इ.स.पूर्व १००० च्या आसपासचा हा काळ आहे. विरली(खं.) येथे गोलाकार शिलावर्तुळ शेकडोंच्या संख्येने आहेत. येथील गोलाकार शिलावर्तुळाच्यामध्ये एक मोडा दगड असतो. ते गावकरी लोकांनी मोठया प्रमाणात काढून टाकले, तरी काही ठिकाणी अजून जसेच्या तसे आहेत.

याचे उत्तम उदाहरण म्हणजे बलदेवबाबा यांची मूर्ती आहे. या मूर्तीला माना समाजाचे लोक आपले कुलदैवत मानून पूजाअर्चा करतात. बलदेवबाबा मेनहीर ही २१ फूट आहे. येथे पुरातत्व विभागाने उत्खनन केल्यास अनेक अवशेष मिळू शकतात. येथील स्मशानभूमीत शेड बांधकाम केले, त्यावेळी घराचे अवशेष मिळाले होते. यावरून येथे मानवी वसाहती अस्तित्वात होत्या. इ. स.पूर्व १००० मध्ये दक्षिण भारतात मानवीजीवन उत्तर भारताच्या तुलनेत विकसित नव्हते. तेव्हा ग्रामीण जीवन येथे अस्तित्वात होते. महापाषाण काळातील अवशेष पवनी तालुक्यात अनेक ठिकाणी मिळतात. पिंपळगाव (निपाणी), खैरी (तेलोता) येथे यापूर्वी शिलाप्रकस्थ मिळाले आहेत. त्यातील पिंपळगाव (निपाणी) येथील अवशेष पुरातत्व विभागाने आपल्या ताब्यात घेऊन तेथे अवशेषांचे सरंक्षण करण्यासाठी सुरक्षा भिंत तयार केली आहे.

विरली (खं.) खैरी (तेलोता) येथील अवशेषांना सुरक्षा भिंत बांधणे आवश्यक आहे. विरली (खं.) येथे शासकीय जागेत हे अवशेष पसरले आहेत. त्यांना संरक्षण देणे आवश्यक आहे. शिलावर्तुळ असलेल्या ठिकाणी उत्खनन केल्यास प्राचीन इतिहास पुन्हा उजेडात येऊ शकतो. तेव्हा लॉकडाऊन संपल्यानंतर येथील उत्खनन कार्य सुरू करणे गरजेचे आहे. मागीलवर्षी पुरातत्व विभाग, नागपूर डॉ. के. आर. के. रेड्डी यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ संरक्षण सहायक हेमंत हुकरे यांनी उत्खनन कार्याकडे लक्ष दिले होते. परत थांंबलेले संशोधन कार्य सुरू करण्याची मागणी होत आहे.

 https://www.misalpav.com/node/50636

महाश्मयुगीन विदर्भातील मृतावशेषांबद्दलचे नवे संशोधन

विषय ओळख प्रथम परिच्छेद सोडून देव शां. भा. यांच्या महाश्‍मयुगीन संस्कृति या मराठी विश्वकोशातील लेखावरून.

मानवी मनाचा एक धागा प्रिय आप्त स्वकीयांच्या स्मृतींशी जुळलेला असतो. मृतांचे दहन केल्यानंतर विधी आणि प्रथा पाळल्या जातात तसे दफन केलेल्या व्यक्तींसाठीही विवीध सांस्कृतिक समुदाय प्रथा पाळत जसे मृतव्यक्ती सोबत अन्न आणि इतर वस्तु आणि बर्‍याचदा प्राणि पुरणे. ज्या समुदायांच्या इतिहासाचे लिखीत माध्यमातून जतन होऊ शकले नाही अशा संस्कृतींच्या प्राचीन दफनभूमींचा पुरातत्वशास्त्रज्ञ आणि इतिहास संशोधक संशोधन आणि अभ्यास करत असतात.

प्रागैतिहासिक काळात मोठमोठ्या ओबडधोबड दगडांची रचना करून स्मारके उभी करण्याची पद्धती होती त्या लोकांच्या संस्कृतीला महापाषाण किंवा महाश्मयुगीन संस्कृती (मेगॅलिथिक कल्चर) म्हणतात. मानवी सांस्कृतिक इतिहासात महाश्मयुग वैशिष्ट्यपूर्ण व महत्त्वाचे ठरलेले आहे. त्याची प्रामुख्याने दोन कारणे आहेत : (१) या संस्कृतीचे अवशेष जगात जवळपास सर्वत्र मिळतात आणि महाश्मयुगीन दफन पद्धतीशी संलग्न असलेल्या काही प्रथा सद्यस्थितीत काही ठिकाणी प्रचलित आहेत. (२) या संस्कृतीचा काळ निरनिराळ्या प्रदेशांत वेगवेगळा आहे. उदा., यूरोपमध्ये या संस्कृतीचा काळ इ. स. पू. तिसरे-दुसरे सहस्रक एवढा असला, तरी भारतात उपलब्ध पुराव्यानुसार तो इ.स.पू. पहिल्या सहस्त्रकाची सुरुवात या आधी फारसा जात नाही.

महाश्मयुगीन संस्कृती समुहां नेमके कोणते होते यांची खुपशी माहिती मिळत नाही. त्यामुळे याबद्दल अभ्यासकात विविध मते प्रचलित आहेत. पण सर्व ठिकाणी ही महाश्मयुगीन स्मारके मानवी दफनाशी संबद्ध दिसतो. यूरोपातील फार मोठा प्रदेश या संस्कृतीने व्यापला आहे तथापि भारताप्रमाणेच यांची वसतिस्थाने उपलब्ध झालेली नाहीत. त्यामुळे या संस्कृतींशी निगडीत असलेले अनेक प्रश्न अद्याप अनुत्तरित राहिलेले आहेत.

भारतीय उपखंडातील महाश्मयुगीन अवशेषांबद्दल अद्याप फारसे विस्तृत संशोधन झालेले नाही. भारतात महाश्मयुगीन संस्कृतीचे तीन प्रादेशिक विभाग पडतात : (१) दख्खन, (२) उत्तर व वायव्य प्रदेश आणि (३) ईशान्य प्रदेश. (उत्तर भारतात फारसे अवशेष सापडलेले नाहीत) .. बलुचिस्तान आणि मकरान येथील अवशेषही वैशिष्ट्यपूर्ण आहेत. या भागातील महाश्मयुगीन दफनात एककेंद्रीय चक्राचे चित्रण असलेली मृद्‌भांडी, लोखंडाच्या वस्तू व घोड्याचे अवशेष सापडतात. या प्रादेशिक महाश्मयुगीन संस्कृतीचा एकमेकींशी काही संबंध होता किंवा कसे व तो असल्यास त्याचे स्वरूप काय होते, याबद्दल निश्चित पुरावा उपलब्ध नाही आणि अवशिष्ट पुराव्याबद्दलही एकमत नाही.

शिळावर्तुळ दफने सर्वांत जास्त ठिकाणी एकवटल्याचे स्थान महाराष्ट्रात भंडारा जिल्ह्यातील खैरबांडा हे होय. दफनातील ही विविधता बऱ्याच प्रमाणात स्थानिक रीत्या उपलब्ध असलेल्या-प्रस्तर, शिळा, दगडगोटे, फरशा या सामग्रीमुळे आलेली आहे, हे नमूद करणे आवश्यक आहे. या विविध प्रकारांना इंग्रजीत भिन्न नावे दिलेली आढळतात: केर्न सर्कल, सिस्ट सर्कल, मेनहीर, डॉलमेनॉइड सिस्ट, टोपीकल इत्यादी. .. नागपूरजवळील माहुरझरी येथील शिळावर्तुळाच्या उत्खननात लोखंडी छिन्न्या, भाले, चपट्या कुऱ्हाडी, तलवारी, कट्यारी, त्याचप्रमाणे कढ्या, बांगड्या व नखण्या मिळाल्या आहेत. याव्यतिरिक्त नक्षी असलेली तांब्याची कडी, सोन्याची कर्णफुले व कंठमाला इ. वस्तूही मिळाल्या. यांपैकी एक कट्यार वैशिष्ट्यपूर्ण असून तिचे पाते लोखंडाचे व मूठ तांब्याची आहे. या व्यतिरिक्त घोड्याच्या तोंडावर घालावयाचे व बहुधा चामड्यावर शिवलेले तांब्याच्या पत्र्यांचे बनविलेले अलंकारही घोड्याच्या अवशेषांबरोबर सापडले. मृत्पात्रांत सर्वसामान्यतः वाडगे, थाळ्या, निमुळत्या बुडाची भांडी असून त्यांच्या झाकण्यांवर कळ्यांची अथवा चार पक्ष्यांची आकृती छोट्या आकारात करून त्या झाकण्यांच्या शीर्षावर बसवल्याचे आढळून आले. (१९८० च्या दशकात झालेल्या संशोधनात या संस्कृतींचा काळ ∼2nd century BC to ∼7th century AD. वर्तवण्यात आला होता)

दफनात आढळून आलेल्या पुराव्यांवरून हे लोक भटके होते का? असा प्रश्न पडतो तथापि त्यात फारसे तथ्य नसावे. या लोकांनी तलाव बांधले, भातशेती मोठ्या प्रमाणावर रूढ केली इ. महत्त्वाच्या बाबी द. भारतातील संगम वाङ्‌मयातील उल्लेखावरून प्रचलित असाव्यात असे दिसते. महाश्मयुगीन दफनपद्धतीच्या काही प्रकारांचा उल्लेखही संगम वाङ्‌मयात आलेला आहे मात्र घरेदारे व वसाहती यांच्या स्वरूपाबद्दलचा पुरावा अद्याप फारसा उपलब्ध झालेला नाही. अगदी अलीकडे महाराष्ट्रात नागपूरजवळील नैकुण्ड व भागी माहारी या ठिकाणी झालेल्या उत्खननात या लोकांच्या गोल झोपड्यांचे अवशेष त्याचप्रमाणे लोखंड बनवायच्या भट्ट्या व गहू, तांदूळ, जव व वाटाणे या धान्यांचे अवशेष सापडले आहेत.

महाश्मयुगीन संस्कृतीचा भारतातील काळ आतापर्यंत तरी प्रामुख्याने दक्षिण भारतातील या संस्कृतीच्या संदर्भात उपलब्ध झालेल्या कार्बन-१४ कालमापनानुसार बराचसा निश्चित करण्यात आला आहे. विसाव्या शतकाच्या मध्यास सर मॉर्टिमर व्हीलर यांनी ब्रह्मगिरीच्या उत्खननाच्या आधारे महश्मयुगीन संस्कृतीचा काल इ.स.पू.सु. २०० ते इ. स. पहिल्या शतकाचा मध्य असा वर्तविला. काही महाश्मयुगीन दफनांत रोमन नाणी सापडल्यामुळे या दफनांचा अंतिम काल इसवी सनाचे पहिले शतक असा निश्चित करता येतो तथापि हल्लूर (कर्नाटक) व टाकळघाट (महाराष्ट्र) येथील पुराव्यांच्या कार्बन –१४ पद्धतीनुसार आलेल्या सनावळ्या अनुक्रमे इ.स.पू. ९५० ± १०० व ११०५ ± १०० आणि इ.स.पू. ५५५ ± ११५ व ६०५ ± ११० अशा असल्याने महाश्मयुगीन संस्कृतीचा प्रारंभकाल कमीतकमी इ.स.पू.सु. १००० इतका मागे नेता आलेला आहे.

***

याच विषयास अनुसरुन विदर्भातील उबळी (नागपूर) आणि चंद्रपूर येथील अवशेषावर आधारीत संशोधन लेख New chronology for MEGALITHIC BURIALS IN VIDARBHA Nikhil Patel अलिकडे (जुलै २०२२) प्रकाशित झालेला आहे. संशोधकांच्या मते मध्य भारतातील महाअश्मयुगीन संस्कृतीबद्दलचे हे संशोधनामुळे तेथिल संस्कृतीच्या अभ्यासास साह्य्यकारी आहेच पण सोबत दक्षिण भारतीय Neolithic-Chalcolithic सांस्कृतिक काळाच्या (∼500 BC to ∼AD 700) अभ्यासासाठी उपयूक्त ठरू शकेल. या वैदर्भीय अश्मयुगिन दफनभूमींची वैशिष्ट्ये म्हण्जे Cairn म्हणजे वर्तुळाकार दगडांनी झाकलेले असणे, अनेक मानवाशेषांसोबत पुरलेल्या घोड्यांचे अवशेष आणि अनावशेष असलेली मातीची भांडी मिळणे. हाडांच्या अवशॅषांच्या अभ्यासास बर्‍याचदा मर्यादा पडतात अशावेळी दातावरील आवरण आणि मातीच्या भाडंयातील अन्नावशेश आणि हे अवशेष पुरलेली माती यांचा अभ्यास मदतीस येतो. या तिन्ही गोष्टींच्या वैज्ञानिक संशोधनातील काळ एकमेकांशी पुरेसा जुळल्याने (ओव्हरलॅप) असा एकत्रित व पद्धतशीर तौलनिक पडताळणी करणारे हे संशोधन रोचक ठरावे.

उबळी येथिल उत्खननात संशोधकांना nail-parers, spearheads, chisels, bridle bits used
for horses, a large number of aurum (archaic gold) micro disc beads, and semi-precious stone beads. The faunal remains here consisted mainly of horse bones and teeth. या गोष्टी मिळाल्या होत्या. तुलनेसाठी १९९५ ९६ काळात चंद्रपूर उत्खनात सापडलेल्या घोड्यांच्या दातांचाही अभ्यास केला गेला.

हे नवे संशोधन म्हणते " However, we here presented new AMS 14 C dates of Megalithic culture in Vidarbha region by dating equine teeth enamel of Ubali burials (Meg-10 and Meg-33) and organic food remains recovered from burial cooking pots. The total age range for Ubali megaliths of the
Vidarbha region is AD 250–1016 .. the regional ecosystem of Vidarbha should have experienced water stressed conditions. This
scenario is corroborated .. that during early historic times (1st–7th century AD), the Vidarbha region was likely receiving significantly less
rainfall .. compared to today.

* पुर्वी वर्तवलेल्या (∼500 BC to ∼AD 700) काळ भाकीता पेक्षा AD 250–1016 हे काळ भाकीत संस्कृतीच्या अधिक काळाची म्हणजे इस्वी 1016 पर्यंत शक्यता वर्तवते.

* The generated isotopic data clearly indicated crop-vegetation values (C 4, millet type).

*

* प्रागैतिहासिक लेखी इतिहास उपलब्ध आहे त्या आधीचा काळ
* मी लेख विषयाचा अभ्यासक नसल्यामुळे लेखातील उल्लेखातील त्रुटींबद्दल चुभूदेघे.
* या विषयाशी अधिक माहिती उलगडण्यात कुणि मदत करू शकेल तर नक्कीच सहर्ष विनंती आणि स्वागत
* विषयास अनुसरून नसलेले, भाषा व्याकरण शुद्धलेखन विषयक प्रतिसाद न देण्यासाठी आभार.

 

* दुरुस्ती
'..आणि अनावशेष असलेली मातीची भांडी मिळणे.
एवजी
..आणि अन्नावशेष असलेली मातीची भांडी मिळणे.

असे वाचावे.

 

इसपू ५०० च्या आसपास हिंदू धर्मातून बौद्ध व जैन वेगळे झाले, याचा अर्थ त्यावेळी हिंदू धर्म बऱ्यापैकी (किमान नर्मदेपर्यंत) सुस्थापित असावा. चितेचा उल्लेख महाभारतात नक्की आहे. म्हणजे किमान इसपू ५०० वर्षे वा त्याच्या आधी. म्हणजे मृत शरीराचे दहन हे देखील सुस्थापित असणार (सध्या हिंदू धर्मातील लिंगायत आणि महानुभव पंथात दफन केले जाते. अजूनही काही असावेत. तसेच काही पंथ त्यावेळी नक्कीच असतील. पण..)
मृत शरीरासोबत भौतिक वस्तू ठेवणे जेणेकरून मृताच्या पुढील प्रवासात उपयोगी पडतील, हा प्रकार आता किंवा तेव्हाच्या हिंदू दफन विधीत कितपत असेल? मृत्यूनंतर पार्थिव शरीराचे 'लाड' केले जात असतील का? कारण आत्मा अमर असतो, आणि मृत्यूनंतर आत्मा पुढील प्रवासाला जातो, पार्थिव शरीर येथेच राहते अशी हिंदू धर्मातील सामान्य धारणा आहे.

अवांतर : (केवळ हवेली व पुरंदर तालुक्यातील मराठा व्यक्तीच्या अंत्यसंस्काराचे निरीक्षण) - दशक्रिया विधीच्या वेळी मृत व्यक्तीला आवडणाऱ्या वस्तू - चिवडा, अंडे, टोस्ट - खारी, अगदी दारूची बाटली, तिथे ठेवल्या जातात. इतर ठिकाणी, इतर जातींमध्ये असं असतं का, माहिती नाही. हा प्रकार मृत शरीराबरोबर काही गोष्टी ठेवणं यातून पुढे आलेला असेल का?

 तुषार काळभोर, विकिपीडियावरील दहन क्रिमेशन आणि मराठी विश्वकोशातील अंत्यविधी विषयक लेख पाहील्यास जागतिक इतिहासात अंत्यविधीचे अनेक प्रकार मिळतात. दहन हे भारत आणि हिंदू धर्मापुरते मर्यादीत नाही. अगदी १७००० वर्षापुर्वीचे ऑस्ट्रेलियन दहन पुरावे पुरातत्व तज्ञांना मिळाले आहेत. दुसरीकडे अगदी ऋग्वेदातही दफनाचेही उल्लेखही मिळतात, माझ्या मते धार्मीक तत्वज्ञानाच्या विकासासोबत ब्राह्मणी अंत्यसंस्कार पद्धती विकसीत होऊन सावकाश पणे काळाच्या ओघात इतर समुदायांनी त्यांचे अनुकरण केले असण्याची शक्यता अधिक असावी. आणखी एक महत्वाची बाजू (ऐतिहासिक काळात) दहन आणि दफन या दोन्ही क्रिया स्थान परिस्थिती साधनांच्या उपलब्धेतेवर निर्भर करत असाव्यात. ज्या व्यक्तीचे अंत्यसंस्कार करावयाचे त्याच्या सोबत एखादीच व्यक्ती असेल तर ती उपलब्ध साधनांच्या मर्यादेत निर्णय घेईल जसे अग्नी उपलब्ध नसेल पण जमीन खोदण्याचे साधन असेल किंवा नैसर्गीक खड्डा उपलब्ध असेल तर पुरण्याचा विचार करेल. खड्डा आणि खोदण्याचे साधन नसेल पण अग्नी उपलब्ध असेल तर अग्नीही देईल. (नदी टेकड्या जंगलात मृतदेह सोडून देण्याचेही प्रकार होतात त्यात नदीत सोडणे हिंदू धर्मातही पुरेशा प्रमाणात होत असावे). दहन विषयक काळाचे पुरातत्वीय पुरावे अधिक कठीण जातात. हिंदू धर्मातील दहनानंतर राख आणि अस्थी नदीत सोडून देण्याच्या प्रकाराने पुरात्त्वीय अवशेष उपलब्ध्तेची शक्यता आणखीनच खालावते. पण या (दहन) पद्धती हिंदूधर्वीयातही सार्वत्रिक होण्यात बराच कालावधी गेला असावा. युद्धावर गेलेल्या राजे महाराजांना त्यांचे चेले किंवा आप्तांनी मृतदेह शोधून दहन संस्कार केले तरच इतर सैनिकांच्या खासकरून अनेक एकट्या दुकट्या सैनिकांच्या नशिबी दफन विधीच आले असण्याची शक्यता आहे.

आणि बहुधा त्यामुळेच युरोपातील आणि भारतातील अश्मयुगीन दफनस्थळात दगडांच्या खुणा ठेवण्याचे साधर्म्य दिसले तरी भारतीय दगडी खुणांच्या दफन स्थळात घोडे आणि शस्त्रांचे अवशेष पुरलेले मिळतात. मृताच्या आवडीच्या गोष्टी ठेवणे हा आत्मा जिवंत राहण्याच्या शक्यते बद्दलच्या श्रद्धेतून होतो. ते दहन केले तरी पिंडदानाच्या वेळी वचन वचन पुर्तीच्या पद्धतीने होतेच.

मी वर लेखात नमुद केले नाही पण घोड्यांच्या मृतावशेषांच्या काळाचा मुद्दा भारतीय इतिहास संशोधनात खूपच महत्वाचा समजला जातो कारण काही (खासकरून आर्य आणि वैदीक संस्कृती बाहेरून आले म्हणणारे) संशोधकांच्या मते सिंधू संस्कृतीत घोड्याचे समकालीन पुरेसे अवशेष मिळत नाहीत मग घोड्याचे उल्लेख करणारी वैदीक संस्कृती किती प्रमाणात एतदेशिय म्हणता येईल का हा एक मोठ्या वादाचा विषय आहे. मुलतः घोड्यांच्या अवशेषांबद्दल पुरातत्वीय संशोधकांनी पुरेसे संशोधन केले का हा प्रश्नही निगडीत असावा. असो.

(प्रतिसादकर्त्यांचे आभार)

 

दौंडजवळ ढवळीकर सरांनी केलेले इनामगावचे उत्खनन खूपच प्रसिद्ध आहे.
त्या वेळी मेल्यानंतर माणसं पुरण्याची पध्दत होती. मात्र पुरताना घोटयाखालचा भाग कापून टाकायचे. का? तर त्या माणसाचं भूत होऊ नये म्हणून! चार हजार वर्षांपूर्वीचे असे १३० सांगाडे सापडले. त्या वेळचे आजारही शोधून काढता आले. असं लक्षात आलं की यातली बरीचशी माणसं मलेरियाने गेली आहेत.
मोठ्यांना पुरण्यासाठी मातीपासून बनवलेली शवपेटी असे तर म्होरक्याला एका चार पायांच्या मातीच्या कुंडीत बसववेल्या अवस्थेत दफन केले जात असे. लहान मुलांना दोन माठ एकमेकांना जोडून त्यात पुरण्याची व्यवस्था असे.

सामान्यांची शवपेटी
a

म्होरक्याची शवपेटी

a

लहान मुलांना असे पुरले जात असे

a

वर तुषार काळभोर यांनी लिहिल्याप्रमाणे महाभारतात चितेचा उल्लेख अगदी स्पष्टपणे आला आहे. पांडूच्या चितेचे वर्णन तर अगदी तपशीलवार केले आहे.

पुराणांत मात्र २ ते ७ वयापर्यंतच्या बालकांचे दहन न करता त्यांचे दफन करावे असे उल्लेख आहेत. संन्याश्याचेही दहन न करता दफन केले जात असे.

इकडे भोसरीत सुद्धा आत्ता आत्तापर्यंत एक शिलावर्तुळ अस्तित्वात होते. सद्यस्थिती जाऊन पाहिली पाहिजे, ते टिकले असेल असे वाटत नाही.

 

lokmat.com

नागपूर जिल्ह्यातील माहुरझरीत आढळली चार हजार वर्षे जुनी दगडी मण्यांची फॅक्टरी

लोकमत न्यूज नेटवर्क

ठळक मुद्देसंरक्षित क्षेत्र जाहीर होणारपुरातत्त्व विभागाने केले उत्खनन

वसीम कुरेशी

नागपूर : उपराजधानीत झिरो माईलपासून केवळ १४ किलोमीटर अंतरावर काटोल मार्गावरील माहुरझरी परिसरात भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षण विभागाने (एएसआय) चार हजार वर्षे जुन्या रंगीत दगडांचे मणी तयार करणाऱ्या फॅक्टरीचा शोध लावला आहे. येथे आभूषणांसाठी दगड घासून मणी तयार केले जायचे. याशिवाय ते विदेशातही निर्यात केले जायचे. येथील उत्खननात अनेक नव्या वस्तू मिळाल्यामुळे याला संरक्षित क्षेत्र घोषित करण्याचा प्रस्ताव पुरातत्त्व विभागाच्या मुख्यालयाकडे पाठविण्यात आला आहे. त्याला मंजुरी मिळाल्यास हे नागपूर सर्कलमधील १४ वे पुरातत्त्व महत्त्व असलेले संरक्षित स्थळ ठरणार आहे. (Four thousand year old stone bead factory found in Mahurzari in Nagpur district)

फेटरीत जुनापानीजवळील माहुरझरीत एका नाल्याजवळ उत्खननात हे स्थळ आढळले आहे. येथे दगडांचे दागिने बनविण्यासाठी कच्चा माल, ते तयार करण्यासाठी विशेष कक्ष, उत्पादनासाठी लागणारी दगडांपासून बनविलेली उपकरणे मिळाली आहेत. ही उपकरणे त्या काळात विदर्भात राहणाऱ्या मानवाच्या कलात्मकतेचे दर्शन घडवितात. सोबतच यावरून दगडांना कलात्मकतेने कोरण्याच्या त्या काळातील मानवाच्या युक्तीचा अंदाज येतो. येथे त्या काळात पुरलेले मानवी सांगाडेही मिळाले आहेत. पाषाणकाळात दगडांवर कोरीव काम करून त्यांना बारीक छिद्र करण्याच्या तंत्राची माहितीही येथे मिळाली, हे सुद्धा उल्लेखनीय ! एएसआयने या प्रकल्पाला सॉल्व्हेजिंग आर्कियालॉजी नाव दिले आहे. नागपूर शहराला लागून असलेल्या या पुरातन स्थळामुळे पर्यटनालाही चालना मिळणार आहे.

‘विदर्भात नागपूर, गोंदिया, भंडारा, चंद्रपूर, गडचिरोलीपर्यंत मेगालिथिक व लोहयुगाच्या संस्कृतीचे स्थान आहे. माहुरझरीचाही यात समावेश आहे. या काळात शिलावर्तुळ तयार करून मृतदेह दफन केले जायचे. त्याचे सांगाडेही मिळाले आहेत. या विषयावर आम्ही अभ्यास केला होता. सध्या काही अवशेष सापडले असून, एएसआयची चमू यावर संशोधनात्मक काम करीत आहे.’

-चंद्रशेखर गुप्त, वरिष्ठ पुरातत्त्व अभ्यासक

रस्ता बनविताना आढळले होते दगड

माहुरझरीत अलीकडच्या काळात रस्त्याचे काम सुरू आहे. त्यासाठी सुरू असलेल्या खोदकामादरम्यान रंगीत दगडांंचे दागिने तयार करण्यासाठी कोरण्यात आलेले दगड आणि कच्चा माल एएसआयच्या चमूला आढळला. तीन महिन्यांपूर्वी एएसआयची चमू या ठिकाणी वृक्षारोपणासाठी गेली होती.

 http://mr.upakram.org/node/3448

शिळावर्तुळे आणि लोहयुग

शिळावर्तुळे अशिया आणि युरोप मधे सापडतात. इतिहासपूर्व कालातील या काही आठवणी आहेत. बहुतांश ठिकाणी साधारण २०-४० फूट व्यासाची ही मोठ्या शिळांची मांडणी असते. बरेचदा यात मध्यभागी एकाचे किंवा अनेकांचे दफन केलेले असते. भारतातही शिळावर्तुळे अनेक ठिकाणी दिसतात. थिरुपोरुर येथील शिळावर्तुळांवर हा लेख जालावर मिळाला. महाराष्ट्रात माहूर येथे ती आहेत असे मी पु.नी फडक्यांच्या पुस्तकात वाचले होते. त्यांच्या मते ही पद्धत शकांची आहे. या शिळावर्तुळांमुळे त्यांची ठिकाणे निश्चित होतात.

नागपूर पासून उमरेड कडे जाणार्‍या रस्त्यावर काही शिळावर्तुळे आहेत. त्यात डेक्कन कॉलेज पुणे यांनी उत्खनन केले होते. उत्त्खननात मृतांचे अवशेष मिळाले. कार्बन डेटिंग मुळे त्यांचा काळ समजला तो साधारण इ.स.पूर्व ५०० असावा. (याबाबतचा दुवा वा संदर्भ मिळाला नाही. माहिती पु.नि. फडक्यांनी दिली.) याच ठिकाणी एका वर्तुळात एक भट्टी सापडली. ही भट्टी सध्या डेक्कन कॉलेज मधे आहे. या भट्टीत लोखंड तयार होत होते.

लोहयुग येणे हा तंत्रयुगातील एक मोठा टप्पा. तत्पूर्वी ताम्रयुगाचा मोठा काळ होता (? ब्रॉन्झ). पण लोहयुगानंतर लढाई(हत्यारे), शेती (लोखंडी नांगरामुळे कठीण जमिनीत शेती करता येणे.), मूर्तिकला इत्यादिंवर मोठा परिणाम झाला. मध्य भारतात लोखंडाचे खनिज आणि दगडी कोळसा असल्याने या भागात लोखंड बनवणे जास्त सोपे होते. इ.स.पूर्व १२०० मधे लोहयुग आले. कर्नाटकात या काळातले लोहयुगाचे अवशेष सापडतात. (विकीची माहिती.)

नागपूरच्या अगदी जवळ म्हणजे १०-१२ कि.मि.मधे काटोल रोड ला जुना पानी नावाचे ठिकाण आहे. काटोलरोड वर टोल नाका आहे हा टोल नाका पार केल्यावर साधारण ३ कि.मि. अंतरावर हे ठिकाण आहे. स्थानिकांना या ठिकाणाची कसलेसे (शंकराचे?) मंदिर असल्यामुळे ओळख आहे. या मंदिराच्या फाट्या समोर माळरान आहे. या माळरानावर शिळा वर्तुळे आहेत. पु.नि. फडक्यांविषय काढला, आणि इतक्या जवळ असल्याने ताबडतोब जाण्याचा निर्णय घेतला. (साधारण पणे सव्वा तासात आम्ही घरी परतलो देखिल.) या ठिकाणी कुठलेही उत्खनन झाले नाही. या जागेवर शेती होत नव्हती. याचे कारण कदाचित पुरातन दफनक्षेत्रामुळे रीतीरिवाजा पैकी हा एक भाग असेल. स्थानिकांना मात्र शिळावर्तुळांबद्दल काही माहिती नव्हती. (देवळात जाणार्‍या एका दोघांना आम्ही विचारले त्यावरून हा अंदाज.)

रस्ता ओलांडल्यावर जवळपास लगेचच ही शिळा वर्तुळे दिसायला लागतात. आम्ही नीट वेळ काढून गेले नसल्याने आणि चिखल असल्याने सर्व भाग नीटसा धुंडाळला नाही. (परत जाऊन किती वर्तुळे, काय मापे अशी मोजमाप करण्याचा विचार आहे.) याशिवाय सोबत कॅमेरापण नेला नव्हता. तेव्हा छायाचित्रे मोबाईल कॅमेरातूनच काढता आली. जमीनीवर दीड दोन फूट उंच (आत किती माहित नाही.) अशा शिळा वीस फुटाच्या व्यासात मांडून ठेवल्या होत्या. दगड एवढे मोठे की काही कारण नसले तर कोणी त्यांना हलवणार नाही. एवढ्या वर्षांनंतर त्यांचा आराखडा बदलला नव्हता. दगडातच भोके करून तेल (चरबी) आणि वात लावण्याचे ठिकाण होते. या ठिकाणा बद्द्ल माहिती सांगताना पु.नि.फडके रंगून गेले होते.

stone circles" alt="">

stonecircle2" alt="">

stonecircle lamp carving" alt="">

pnphadke at junapani stone cirlcles" alt="">

पु.नि.फडक्यांनी लिहिलेल्या शकांसंबंधीच्या पुस्तकाबद्दल मी पूर्वी लिहिले होते. त्यांच्या लेखांचा दुवा त्यांनी मला यावेळी दिला. लोखंडाच्या खनिजापासून लोखंड तयार करण्यासाठी जास्त तापमान आणि हवेशी संपर्क टाळणे या दोन महत्वाच्या गोष्टी असतात. (तांब्यासाठी या अडचणी कमी असतात.) लोहखनिज आणी दगडी कोळशाची पूड मातिच्या कुपीत भरून भट्टीत टाकायची. आणि तापमान वाढले की लोहखनिजातील ऑक्सिजन कार्बनशी संयोगित होतो आणि लोहाचा रस आणि कर्बद्विप्राणिद बाहेर पडतो. असे काहीसे ते वर्णन करीत होते. या काळातील भारतीय लोखंड जगभर (तेव्ह्याच्या जगाच्या व्याप्तित) जात असे. आणि ते अतिशय प्रसिद्ध होते. शिळावर्तुळातल्या शिळेवरच्या पणत्यांच्या भोकांमधे लोखंडी हत्यार वापरले असणार. एवढेच नाही तर या शिळांना कदाचित तासून (एकसारख्या आकाराच्या होईपर्यंत) ठेवले होते. या दोन्ही लोहयुगाच्या खुणा येथे होत्या.

थिरुपोरुर येथील शिळावर्तुळांबाबत वाचताना हे जाणवले की अशी ठिकाणे असली तरी त्याचे उत्खनन होत नाहीत. कारण आर्किऑलॉजिकल विभागाकडे एवढा पैसा नाही. जुनापानी येथील शिळावर्तुळे देखिल उत्खननास कधी येतील हे माहित नाही. स्थानिक आख्यायिकांमुळे कदाचित ही अद्याप टिकून आहेत. पण पुढील काळात वाढत्या शहराच्या गरजांमुळे लुप्त देखिल होऊ शकतात.

प्रमोद

 
येसंबा येथे सापडली 71 शिलावर्तुळे
https://www.tarunbharat.net/Encyc/2023/4/30/71-stone-circles-found-at-Yesamba-Shila.html




 
भारतातील प्रामुख्याने दक्षिण भारत विदर्भात विविध ठिकाणी झालेल्या (Yesamba Shila) खणनातून हे समोर आले आहे की, तत्कालीन समाजात मृत पूर्वजांना अत्यंत आदरपूर्वक व विशिष्ट पद्धतीने जमिनीत पुरवण्याची पद्धत प्रचलित होती. ज्यात मृत व्यक्तीशी संबंधित लोखंडी, ताम्र व मिश्रधातूची अवजारे, कधी कधी पशु सुद्धा व्यक्तीसोबत दफन करत होते, असे अन्य ठिकाणांच्या प्रत्यक्ष उत्खननातील पुराव्यावरून लक्षात आले आहे. वर्धा नजीकच्या येसंबा येथे अशाच प्रकारची पद्धत प्रचलित असावी, असे संशोधक ओशीन बंब म्हणाले. विदर्भात अशी महापाषाण संस्कृतीची लोहयुगीन अनेक स्थळे अस्तित्वात आहेत. वर्धा नजीकच्या येसंबा येथील प्राचीन अवशेषांच्या शोधामुळे विदर्भातील एक महत्त्वपूर्ण अशा महापाषाण संस्कृतीच्या स्थळाचा शोध लागला आहे.
      ब्रिटिशांनंतर नागपूर विद्यापीठ, डेक्कन कॉलेज पुणे व महाराष्ट्र राज्य पुरातत्त्व विभागाचे Yesamba Shila वेगवेगळ्या ठिकाणी संशोधन सुरू आहे. वर्धा नजिकच्या येसंबा येथे सापडलेल्या शिलावर्तुळाच्या रचनेमध्ये बाहेर मोठे दगड वेगवेगळ्या आकाराचे असून आतमध्ये लहान दगडांनी भरलेले दिसून आले. कदाचित पुनर्जन्म आणि मृत व्यक्तीबद्दल आदरभाव कारणांमुळे तत्कालीन ग्रामीण संस्कृतीमध्ये ही विशेष दफनविधी परंपरेने प्रचलित होती. येसंबाच्या शिलावर्तुळाच्या आकारावरून व मिळालेल्या दफन सामग्रीवरून व्यक्तीच्या सामाजिक स्तराचा परिचय होतो, असे काही अभ्यासकांचे मत आहे.
येसंबा येथील ही शिलावर्तुळे (Yesamba Shila) संरक्षित असणे आवश्यक आहे. कारण गिट्टी- मुरुम यांचा अतिरेकी उपसा वाढत गेल्यामुळे हा वारसा धोक्यात आल्याचे दिसून येते. ही शिलावर्तुळे  शोधण्यासाठी स्थानिक रहिवासी पंचशील थूल यांनी मोलाचे सहकार्य केले असल्याचे संशोधक ओशिन बंब यांनी तरुण     भारत सोबत बोलताना सांगितले. या शोधकार्यावर ओशिन बंब यांचा संशोधन लेख नुकताच ’जर्नल ऑफ हिस्ट्री आर्किओलॉजी अँड आर्किटेक्चर  31 डिसेंबर 2022 च्या विशेष अंकात प्रसिद्ध झाला आहे.

 



ब्रम्हपुरी येथील प्राचीन अवशेषाबरोबरच कोल्हापुर  जिल्ह्यातील हातकणंगले तालुक्यातील माढाळे गावाजवळ प्रथमच दोन चक्रव्यूह सापडले आहेत. कोल्हापूर शहरापासून सुमारे ३५ किमी अंतरावर आढळलेले चक्रव्यूह, महाराष्ट्राच्या पश्चिम किनार्‍यावरून भारताच्या भुप्रदेशाच्या मध्यभागी आणि भारताच्या इतर भागांमध्ये जाण्यासाठी असलेल्या व्यापारी मार्गात कोल्हापूर क्षेत्राचे महत्त्व अधोरेखित करतात.पश्चिम महाराष्ट्रातील कोल्हापूर, कराड आणि तेर हे प्रदेश परदेशी व्यापाराचे प्रमुख केंद्र होते.१९४५ मध्ये ब्रम्हपुरी येथे डॉ एच डी सांकलिया आणि श्रीमान दीक्षित यांनी केलेल्या उत्खननात सापडलेल्या ग्रॅको-रोमन सागरी देव पोसायडॉनची मूर्ती आणि कांस्य पॉलिश केलेला आरसा असे सूचित करतो की कोल्हापूर हे व्यापाराचे केंद्र आणि व्यापाराचे केंद्र होते.
       तमिळनाडू, गोवा, कर्नाटक आणि पश्चिम महाराष्ट्रातील सांगली जिल्ह्यातही अशाच प्रकारचे चक्रव्यूह यापूर्वी आढळून आले आहेत. सांगली जिल्ह्यातील वाळवा आणि कवठे महाकाळ तालुक्यात सुमारे २००० ते २२०० वर्षे जुन्या चार चक्रव्यूहाचा शोध यापूर्वी लावला होता. २०२१ मध्ये, हा शोध लंडनमधील चक्रव्यूह आणि चक्रव्यूहातील तज्ञ जेफ सॉवर्ड यांनी प्रकाशित केलेल्या 'कॅरड्रोइया' जर्नलच्या ५० व्या आवृत्तीत प्रकाशित झाला होता.कोल्हापुरात नव्याने सापडलेले हे चक्रव्यूह प्राचीन आणि सांगलीत पूर्वी सापडलेल्या चक्रव्यूहाच्या मालिकेसारखेच आहेत. ही रचना प्राचीन सांस्कृतिक इतिहास दर्शवते.
हे चक्रव्यूह व्यापारी व्यापाऱ्यांसाठी दिशा चिन्ह म्हणून काम करतात. भूलभुलैया अनेक संस्कृतींमध्ये प्रजनन प्रतीक म्हणून संबंधित आहेत आणि लोकांसाठी ध्यान साधन म्हणून देखील काम करतात. स्थानिक लोक त्यांना 'कोडे' (कोडे) म्हणून संबोधतात, परंतु वेगवेगळ्या संस्कृतींमध्ये त्यांना 'चक्रव्यूह', 'मंचक्र' आणि 'यमद्वार' असेही म्हणतात.कोल्हापूर जिल्ह्यात आणखी चक्रव्यूह सापडण्याची शक्यता आहे.


 Submitted by वरदा on 24 September, 2009 - 04:31
jorwe pot.jpg
(छायाचित्र प्रताधिकारः श्री पद्माकर प्रभुणे)
 
सहसा महाराष्ट्राचा सर्वात प्राचीन इतिहास म्हणजे आपल्याला सातवाहन काळातली लेणी वगैरे माहित असतं. ज्यांना थोडाफार जुनी पुस्तकं धुंडाळायचा नाद असतो त्यांनी महाराष्ट्राचे आद्य रहिवासी कोण? शक/नाग/आभीर, पुराणांतरींचे पुरावे काय सांगतात? वगैरे चर्चा वाचलेल्या असतात. पण या सगळ्या माहिती-चर्चा-वादाच्या जंजाळात पुरातत्वीय पुरावे सर्वसामान्यांपर्यंत फारसे चटकन पोचत नाहीत आणि अद्ययावत शास्त्रीय माहितीबद्दल बहुतांशी वाचक अनभिज्ञच रहातात. हे असं पुरातत्वीय संशोधन महाराष्ट्राच्या जडणघडणीबद्दल, इथल्या आद्य रहिवाशांबद्दल, त्यांच्या जीवनशैलीबद्दल काय सांगतं हे जाणून घेण्यासाठी, सगळ्यांपर्यंत पोचवण्यासाठी हा लेखनप्रपंच. (इथे लिहिलं आहे त्यापलिकडे अजून संशोधन फारसं झालेलं नाही. जे झालंय/चाललंय ते प्रकाशित झालेलं नाही. जेव्हा होईल तेव्हा इथे अपडेट मारेनच. तेव्हा इथे जे लिहिलंय ते सध्यापुरतं अंतिम सत्य मानायला हरकत नाही)
मुळात महाराष्ट्राच्या इतिहासाची साकल्याने चर्चा इतिहासाचार्य राजवाडे, राजारामशास्त्री भागवत आणि ज्ञानकोशकार केतकर यांनी सुरू केली. याच्या थोडं आधीपासूनच भाऊ दाजी लाड, भगवानलाल इंद्रजी, जॉर्ज ब्यूह्लर (Bühler) इत्यादी इंडॉलॉजिस्ट्सनी प्राचीन इतिहासाची साधनं अभ्यासायला सुरूवात केली होती. त्याचबरोबर आर्कियॉलॉजिकल सर्व्हे ऑफ इंडिया च्या डी. आर. भांडारकर, हेन्री कझिन्स अशा अधिकार्‍यांनीही महाराष्ट्रातील (तेव्हाची बॉम्बे प्रेसिडेन्सी) पुराणवस्तू-अवशेषांचा अभ्यास करण्याचे काम हाती घेतले होते. पण तत्कालीन राजकीय पार्श्वभूमीमुळे जीवन झोकून देऊन स्वखर्चाने काम करणारे राष्ट्रवादी (nationalist) इतिहासकार आणि तितक्याच तळमळीने पण सरकारी संस्थांबरोबर/ त्यांच्या सहाय्याने काम करणारे इंडॉलॉजिस्ट्स आणि पुरातत्त्वशास्त्रज्ञ यांच्यात कायमच एक दरी राहिली. दुर्दैवाने दोघांनीही एकमेकांच्या कामाची फारशी दखल घेतलेली दिसत नाही. त्यातच राष्ट्रवादी मराठीत लिहिणार तर सरकारी अहवाल आणि अमराठी लोकांनी केलेले संशोधन इंग्लिशमधे हा मुद्दा होताच. शिवाय बहुतेक राष्ट्रवादी इतिहासकारांच्या संशोधनाचा केंद्रबिंदू स्वाभाविकपणे शिवकाळ / मराठा काळ होता तर प्राचीन इतिहास व संबंधित शिलालेख, नाणी, मंदिरे - लेण्या, उत्खनने हे सगळं बर्‍यापैकी सरकारी अखत्यारीत होतं - ज्याला आपण colonial Indology and archaeology असं म्हणतो.
१९४०-४५ पर्यंत महाराष्ट्रात अगदीच तुरळक उत्खनने झाली. उदा: निझाम सरकारच्या पुरातत्त्व खात्याने केलेले पैठण येथील व भारत इतिहास मंडळाने केलेले कराड येथील उत्खनन.. पण त्यात मिळालेले पुरावे अगदीच मर्यादित होते आणि त्यामुळे महाराष्ट्राच्या इतिहासाच्या रूपरेखेत फारसा बदल झाला नाही. स्वातंत्र्यप्राप्तीनंतर मात्र पुरातत्त्वशास्त्रीय संशोधनाला महाराष्ट्रात चांगलाच वेग आला आणि या प्रदेशात मनुष्यवस्ती कधीपासून झाली आणि त्यात कसे आणि कोणते बदल होत गेले याचे एक बर्‍यापैकी सुसंगत चित्र आपल्यासमोर उभे राहिले.
अजूनही नित्य नूतन संशोधन होतच आहे. आज आपण इथे जी माहिती वाचणार आहोत ती बहुतांशी या पुरातत्त्वीय आणि ऐतिहासिक साधने आणि संशोधनावर आधारित आहे.
काय असतात ही साधने? हे पुरातत्त्वीय पुरावे?
आपल्याला सगळ्यांनाच माहित आहे की पुरातत्त्वशास्त्रज्ञ भूभागाचे सर्वेक्षण करून जुन्या मानवी वस्तींची ठिकाणे शोधून काढतात आणि त्यातील महत्त्वाच्या ठिकाणी उत्खनन करून त्या वसाहतींच्या अवशेषांचा अभ्यास करतात. सर्वसामान्यपणे उत्खननात मिळणारे अवशेष म्हणजे घरांच्या जमिनी/ plans, खापरांचे तुकडे, हाडे, दगडाची व धातूची औजारे व हत्यारे, दफने, धान्याचे जळालेले दाणे, मणी, राख, माती, इ,. या सगळ्याचे परीक्षण करून विविध निष्कर्ष काढले जातात व शक्य असेल तिथे कालमापन पध्द्ती वापरून या अवशेषांचे वयोमान ठरवतात. इतिहासपूर्व काळात, लिखित स्वरूपाचे कुठलेही पुरावे नसताना, फक्त याच पुराव्यांचे दुवे जुळवत आपल्याला पुढे जायला लागते.
एकदा ऐतिहासिक कालखंडात आलं की या सगळ्या गोष्टींबरोबरच शिलालेख, ताम्रपट, नाणी, ग्रांथिक पुरावे, वास्तुकला, ही साधनेही मदतीला येतात. आणि या सगळ्याचा साकल्याने अभ्यास करून आपल्याला इतिहास लिहिता येतो.
१९४७ पर्यंत महाराष्ट्राचा इतिहास फक्त दोन हजार वर्षे मागे नेता येत होता. सातवाहन राजांचे शिलालेख, नाणी, तत्कालीन लेणी इ. पुराव्यावरून हे महाराष्ट्रातलं पहिलं राजकुल असावं असा निष्कर्ष संशोधकांनी काढला होता. पण त्याआधी इथे कुणाची वसाहत होती? किती आधीपासून होती? या प्रश्नांची उत्तरं मात्र मिळत नव्हती. मग त्या स्पष्टीकरणासाठी पुराणांतरी उल्लेख आलेल्या शक, नाग, हूण अशा वेगवेगळ्या कुलांच्या स्थलांतरांमधे धांडोळा घेतला जात होता (पहा :- राजवाडे, केतकर, भागवत, इ. इ.). हे सगळं चित्र अचानक बदललं. कसं? त्याचीही कहाणी तितकीच रंजक आहे..
भारतातल्या इतर लाखो खेडेगावांसारखंच एक जोर्वे होतं. संगमनेरच्या पूर्वेला ६ मैलांवर, प्रवरेच्या काठी वसलेलं एक सर्वसाधारण खेडं. आपल्याकडे तशी अधूनमधून अस्मानी संकटं येत असतात, त्याचाच एक प्रकार म्हणून १९४७ साली प्रवरेला मोठ्ठा पूर आला. या पुरात गावच नव्हे तर शेतंसुद्धा पाण्याखाली गेली. परत अशा प्रकोपाला तोंड देणं सोयीचं व्हावं म्हणून गावाने नदीच्या काठापासून थोडी आत, चढावर वस्ती हलवली आणि आसपासची जमीन शेतीखाली आणायचं ठरवलं. आणि काय आश्चर्य! शेतीत नांगरताना अफुट, अखंड, मातीची भांडी सापडायला लागली. नेहेमीसारखी करडी, काळी, लालसर माठाची मडकी नव्हेत तर अगदी उत्तम भाजणीची, लाल रंगाची, वरती काळ्या रंगाने सुंदर नक्षीकाम केलेली तोटीची भांडी! आणि तांब्याची कुर्‍हाडीची पाती.
कुठल्याही गावाला जशी स्थानिक परंपरा, मौखिक गोष्टींतून चालत आलेला इतिहास असतो, तसा जोर्वेला सुद्धा होता. म्हणे कोणे एके काळी ही खुद्द जरासंधाची नगरी होती. त्यामुळे ही मडकी नक्कीच अशी पुराणकाळातली असली पाहिजेत असं आसपासच्या लोकांना वाटलं असणार!
ही सगळी बातमी कानोकानी होत होत पोचली ती संगमनेरच्या तालुका डेव्हलपमेन्ट बोर्डमधे काम करणार्‍या शंकर साळी नामक तरुणाकडे. त्याने उत्साहाने या गावाला भेट देऊन ती खापरं पाहिली आणि त्यासंबंधी एक छोटीशी बातमी दैनिक भारत या स्थानिक वृत्तपत्रात छापून आणली. आणि ही सगळी माहिती आणि खापरं घेऊन गाठलं या क्षेत्रातल्या एका जाणकाराला! डॉ. ह धी. सांकलिया यांना.
त्यावेळी पुण्याच्या डेक्कन कॉलेज या संस्थेत नुकताच पुरातत्त्वशास्त्राचा विभाग सुरू झाला होता. डॉ. ह. धी. सांकालिया या तरुण पुरातत्त्वशास्त्रज्ञाची तिथे नेमणूक करण्यात आली होती. मुंबईत संस्कृत शिकून, इंडॉलॉजीचा अभ्यास करून, नंतर इंग्लंडमधे खुद्द मॉर्टिमर व्हीलर नामक प्रख्यात पुरातत्त्वज्ञाच्या हाताखाली त्यांनी प्रशिक्षण घेतले होते. इथे विद्यापीठ पातळीवर सरकारी चौकटीच्याबाहेर नव्याने पूर्ण विभागाची/ज्ञानशाखेची उभारणी करण्याचं काम मोठ्या तडफेने त्यांनी सुरू केले. त्याचा एक भाग म्हणून नाशिक या पुरातनकालापासून अस्तित्वात असलेल्या नगरीचे उत्खनन करायचं ठरलं होतं. श्री. साळींनी आणलेली खापरं त्यांनी पाहिली आणि जोर्वेलाही छोटंसं उत्खनन करायचं असं ठरवलं.
१९५० साली उत्खनन केल्यावर ही खापरं एका ग्रामसंस्कृतीची निदर्शक आहेत हे कळलं; पण पुढच्या मागच्या वसाहतीचा कुठलाच मागमूस नसल्याने आणि तोपर्यंत शास्त्रीय कालमापन पद्धती अस्तित्वात नसल्याने महाराष्ट्राच्या सांस्कृतिक कालानुक्रमात हे सगळं कुठं बसवायचं हा प्रश्नच होता! नाशिकच्या उत्खननाने मात्र हा प्रश्न समूळ सोडवला. तिथे सातवाहनकालीन वसाहतीच्या खालच्या थरांमधे अशीच रंगीत, नक्षीदार खापरं आणि ग्रामसंस्कृतीचे अवशेष मिळाले. आत्तापर्यंत हे ही स्पष्ट झालं की या समाजाला लोखंड बनवायचं तंत्रज्ञान अजून अवगत झालं नव्हतं. माहित होतं फक्त तांबं आणि दगड - म्हणून यांना ताम्रपाषाणयुगीन वसाहती म्हणतात.
अशा तर्‍हेने महाराष्ट्रातील वसाहतींचा इतिहास एकदम २००० वर्षे मागे गेला आणि इतिहासपूर्वकालीन महाराष्ट्राच्या संशोधनाला जबरदस्त चालना मिळाली!
एकदा जोर्वेचा शोध लागल्यानंतर आसपासच्या प्रदेशातून आणि पूर्ण पश्चिम आणि उत्तर दख्खनच्या पठारावर तसेच महाराष्ट्र - कर्नाटक सीमाभागातही अनेक ताम्रपाषाणयुगीन वसाहती सापडल्या, सापडत राहिल्या. आणि डेक्कन कॉलेजच्या पुढाकाराने जवळजवळ २० स्थळांचे लहानमोठ्या प्रमाणात उत्खननही झाले. यात तापी खोर्‍यातील प्रकाश, सावळदा, बहाळ, टेकवडे, कवठे, गोदावरी-प्रवरा खोर्‍यातील दायमाबाद, नेवासा, आपेगाव तसेच भीमा खोर्‍यातील शिरूरजवळ इनामगाव, बारामतीजवळचं सोनगाव, थेऊर इत्यादी स्थळांचा प्रामुख्याने समावेश होतो. या उत्खननांमुळे आज आपल्याला महाराष्ट्राच्या इतिहासपूर्व कालीन आदिम वसाहतींचा चेहरामोहरा कसा होता हे सांगता येतं.
Picture1.jpg
(जाता जाता थोडं विषयांतर:- या शोधाने एका व्यक्तीचं आयुष्यच पूर्ण बदलून टाकलं. संगमनेरच्या तालुका डेव्हलपमेंट बोर्डमधे नोकरीला असलेल्या श्री. शंकर अण्णाजी साळी या तरुणाचं. स्वतःची नोकरी सोडून हा चक्क पुरातत्त्वशास्त्राच्या विद्याभ्यासामागे लागला. एवढंच नव्हे तर डेक्कन कॉलेजमधून शिक्षण पूर्ण करून ASI (Archaeological Survey of India) मधे चांगला हुद्दा पटकावला. आणि कालांतराने याच ताम्रपाषाणयुगीन संस्कृतीचे महाराष्ट्रातील सर्वात मोठे स्थळ दायमाबाद याचे यशस्वीरित्या उत्खननही केले!!)
तर महाराष्ट्रात आदिमानवाचा वावर सुमारे ७ -८ लाख वर्षांपासून होता असे दिसून येते. हा अश्मयुगीन मानव समाज भटका आणि शिकारी असल्याने त्याच्या घराबिरांचे अवशेष मिळणार नाहीत हे उघडच आहे. आपल्याला मिळतात ती फक्त त्यांनी बनवलेली दगडांची हत्यारं. अशी ७ लाख वर्षांपूर्वीची प्राचीन हत्यारं सापडली आहेत मोरगाव (हो, गणपतीचं मोरगाव!), जुन्नरजवळ बोरी आणि नेवाश्याजवळ चिरकी नाला (अंदाजे ३.५ लाख वर्षं) येथील उत्खननात. अशीच एक - थोडीशी नंतरच्या काळातील - वसाहत सापडली जळगाव जिल्ह्यात पाटणे येथे. सुमारे २५ ते ३०,००० वर्षांपूर्वीच्या या हत्यारांबरोबरच रेघांनी सुशोभित केलेलं शहामृगाच्या अंड्याचं एक टरफलही सापडलं..
ही अशी लाखो वर्षं भटक्या अवस्थेत काढल्यानंतर सुमारे साडेचार हजार वर्षांपूर्वी महाराष्ट्रात शेतीच्या तंत्रज्ञानाचा प्रसार व्हायला हळुहळू सुरूवात झाली. भारतात शेतीच्या तंत्रज्ञानाचा उगम कमीतकमी ३ ठिकाणी स्वतंत्रपणे झाला असं आता संशोधकांना मान्य आहे. यातील एक केंद्र बलुचिस्तान प्रांत (ई.स. पू. ६०००) - ज्यातून पुढे सिंधू संस्कृती उदयाला येण्यास हातभार लागला, दुसरे विंध्य - कैमूर पर्वतातील अलाहाबाद आणि गंगा यामधला बेलन खोर्‍याचा भाग (ई.स. पू. ६००० - ७०००) आणि तिसरे ईशान्य भारत.
आपल्या आधी राजस्थान, गुजरात, माळवा या प्रदेशांमधे शेती करणारा समाज उदयाला आला होता. तिथेही ही वाटचाल अश्मयुगाकडून शेतीकडे अशी सलग झाली. त्यांच्याकडूनच उपजीविकेच्या या नव्या तंत्राची ओळख नर्मदेच्या दक्षिणेला रहाणार्‍या मानवसमूहाला झाली असं दिसतं. या सर्व प्रसारामधे मात्र एका लोकसमूहाने विविध ठिकाणी पांगून जाऊन, नव्या वसाहती करून शेतीची ओळख त्या त्या प्रदेशाला करून दिली असं काही दिसत नाही. त्या त्या प्रदेशातील स्थानिक लोकांनी शेजारच्या शेती करणार्‍या समाजांकडून हे नवं तंत्र आत्मसात करून घेतलं.
असो. परत येऊया महाराष्ट्रातील आदिम वसाहतींकडे..
आपल्याकडील ताम्रपाषाणयुगीन वसाहतींचा कालखंड सुमारे इ.स. पूर्व २४५० ते इ.स. पूर्व ९००/७०० असा आहे.
या वसाहतींचा आढावा घेताना आपण एकत्रच या सगळ्या कालावधीचा विचार करणार आहोत. अजूनही आपल्याला मध्याश्मयुगातून नवाश्मयुगात/ ताम्रपाषाणयुगात (म्हणजे आदिमानव ते शेतकरी - पशुपालक) समाजाची वाटचाल दाखवणारा कुठलाही ठोस पुरातत्त्वीय पुरावा महाराष्ट्रात सापडलेला नाहीये. आपल्याला उपलब्ध असलेल्या उत्खनित पुराव्यावरून असे दिसते की गुजरातमधून आपल्याकडे या शेती तंत्रज्ञानाचा प्रसार झाला असावा.
धुळे जिल्ह्यातली कवठे इथली वसाहत अशा नव्याने शेती शिकलेल्या समाजाची प्रथम वाटचाल दाखवते. इ. स. पूर्व २४५० च्या आसपासचं हे गाव हंगामी होतं. जेवढं शेतीवर तेवढंच पशुपालन आणि शिकारीवर अवलंबून होतं. पूर्ण वर्षभर एकाच ठिकाणी मुक्काम करत नसल्याने अत्यंत कमी श्रमात बांधल्या जाणार्‍या गोल झोपड्यांचा वापर ते करत. या झोपड्यांच्या जमिनी थोड्याशा खोल खड्ड्यासारख्या केलेल्या असत (pit dwellings). एका 'घरात' रहाण्याच्या खड्ड्याशिवाय कोंबड्या ठेवायला/ साठवणीसाठी इ. २-३ खड्डे असत.
कवठे येथील घर
kaothe.jpg
अशी हंगामी गावं लौकरच कायमस्वरूपी स्थिरावली, शेतीच्या तंत्रातही प्रगती झाली आणी त्यांचे रूपही पालटले.
आजवर अशी १५०हूनही जास्त स्थळं उजेडात आली आहेत. जरी या सर्व वसाहती ग्रामीण होत्या तरीही त्यांच्यातही फरक होते. यातली काही गावे बर्‍यापैकी मोठी होती. दायमाबाद सगळ्यात जास्त - म्हणजे जवळजवळ ३०हेक्टर मोठं होतं आणि त्याला तटबंदी होती तर इनामगाव आणि प्रकाश ५ हे. च्या आसपास. बाकीच्या वस्त्यांचं आकारमान मात्र १ ते ३हे. च्या मधे होतं. यांमधे स्थायी स्वरूपाची खेडी, हंगामी वाड्या, असे विविध प्रकार होते. या सगळ्या वसाहती काळ्या मातीच्या (black cotton soil), चराऊ कुरणांच्या आणि जलस्रोतांच्या सान्निध्यात वसलेल्या होत्या.
गावात आखीवरेखीव रस्ते बहुदा नसतच पण आजच्या खेड्यांसारखंच घरांच्या मधल्या जागेचा वापर गल्लीबोळांसारखा केला जात असावा. बहुतेक सगळी घरं चौकोनी आणि कुडाची असत. शिवाय बाभूळ, सागवान, धावडा, खैर, बांबू, रोझवुड अशा झाडांची ला़कडे घरबांधणीत वापरली जात असत (मुख्यतः खांबांसाठी). जमिनी मुरूम्,माती टाकून चांगल्या चोपून मग मातीने, शेणाने किंवा क्वचित चुन्याने सारवलेल्या असत. बहुतेक घरं एक किंवा दोन खोल्यांची. एका मोठ्या खोलीत मधे कुडाने पार्टिशन करून एका बाजूला चूल आंणि साठवणीची जागा असंही बर्‍याच घरांमधे आढळून आलंय. अपवाद म्हणून काही घरं ४-५ खोल्यांची असत. ती कदाचित गावातल्या महत्त्वाच्या व्यक्तींची असावीत. सगळ्या घरांना छान सारवलेली अंगणं असत. घरांची छपरं गवताने शाकारलेली असत. घरांमधे हमखास आढळणार्‍या गोष्टी म्हणजे चूल, साठवणाची सोय आणि पाटा-वरवंटा. (त्या काळातला पाटा थोडासा रगड्यासारखा खोलगट आणि वरवंटा म्हणजे गुळगुळीत गोटा असे..)
इनामगावला मिळालेल्या घरांचे आराखडे
inm.jpg
यात सर्वात लक्षवेधक काय असेल तर साठवणीसाठी असलेल्या विविध सोयी. आजच्यासारखंच बेभरवशी अर्धशुष्क हवामान तेव्हाही होतं. त्यामुळे वरकड धान्य साठवणं तेव्हाही महत्त्वाचं असणार! साठवणीसाठी वापरण्यात येणारे भक्कम मोठ्ठाले रांजण तर उत्खननांमधे सापडलेच आहेत. पण त्याशिवायही मातीत खड्डे खणून त्यांना चुन्याचा गिलावा देऊन धान्य साठवले जात असे. शिवाय मातीचे गोल कट्टे करून त्यात वाळू आणि बोरीचे काटे घालून (खालून उंदीर-घुशी लागू नयेत म्हणून) त्यावर कणग्या ठेवत असावेत. काही खास चार लांब पाय असलेले रांजण ४ दगडांच्या टेकूने किंवा ४ खळग्यांमधे उभे करून त्यातही साठवण केली जात असे. इनामगावला तर या सगळ्या घरोघरच्या साठवणीव्यतिरिक्त एक स्वतंत्र धान्याचं कोठारच होतं. बहुतेक गावाच्या मालकीचं.
चूल म्हणजे काही वेळा नालाच्या आकारात मातीने बांधून काढलेली पण बहुतेक वेळा एक उथळ खड्डा, त्यात मध्यभागी भांड्याला आधार म्हणून एक दगड किंवा मातीचा उंचवटा. या खड्ड्याचे काठ जमिनी पासून थोडे उचललेले - गरम राखबिख बाहेर सांडू नये यासाठी. काट्याकुट्यांच्या सरपणाबरोबरच शेणाच्या गोवर्‍याही इंधन म्हणून यात स्वाहा होत.
एरवी घरात भांडीकुंडी सगळी मातीची. या गाडग्यामडक्यांचे प्रकार तरी किती! रांजण, हंड्या, तपेली, लोट्या (तोटीच्या/ बिनतोटीच्या), छोटेमोठे वाडगे, थाळ्या, झाकणं, तसराळी, चंबू, गडू, इ.इ.. यातले काही प्रकार सोडले तर खूपशी भांडी गेरू-लाल रंगाची. आणि त्यावर काळ्या रंगाने ठसठशीतपणे काढलेली नक्षी - विशेषतः वाडग्यांवर. हे वाडगे म्हणजे तत्कालीन 'टेबल वेअर' म्हणाना! त्यामुळे आज जशी टेबल वेअरमधे विविध डिझाइन्स असतात, तसंच काहिसं! अगदी सुरुवातीच्या काळात भांड्यांवर प्राणी, पक्षी यांची चित्रं आढळतात. नंतर मात्र रेघारेघांची किंवा फ्री हँड नक्षी मोठ्या प्रमाणात दिसून येते. या भांड्यांबरोबरच छानपैकी चौकोनी, लंबगोल अशा आकाराच्या पणत्यासुद्धा मिळतात.
(या लेखाच्या प्रारंभालाच इनामगाव येथून मिळालेल्या एका संपूर्ण हंड्याचं छायाचित्र आहे त्यावरून रंगाची कल्पना येईलच. त्या हंड्यावर एक हरीण/अ‍ॅन्टेलोप काढलेलंही स्पष्ट दिसत आहे)
mlw ware.jpgbowls.jpglamps_0.jpg
रोजची औजारं-हत्यारं बघायची झालं तर दगडाची जास्त आणि तांब्याची कमी (कारण दगडाला असलेली जास्त धार आणि तांब्याची मर्यादित उपलब्धता). वाळूत घासून घासून गुळगुळीत चकचकीत केलेल्या दगडाच्या कुर्‍हाडी, गारगोटीचे छिलके काढून तयार केलेली सूक्ष्म पण अत्यंत धारदार पाती (ही लाकूड किंवा हाडाच्या खोबणीत एकापुढे एक बसवून विळा, कोयता, सुरी अशांसारखी हत्यारं तयार व्हायची!), तांब्याच्या कुर्‍हाडी, छिन्नी, तांब्याचे गळ, हाडांनी, दगडांनी तयार केलेली बाणाची टोकं, असं काय काय!
लोक कपडेबिपडे घालत होते की नाही हे समजायला फारसा पुरावा नाही. पण बहुदा भाजक्या मातीच्या 'टकळ्या' असाव्यात अशा काही वस्तू उत्खननांमधे मिळाल्यात. अर्थात इतर प्राचीन समाजांप्रमाणेच इथेही नाना प्रकारचे अलंकार वापरात असलेले दिसतात. भाजक्या मातीच्या, शंखाच्या, तांब्याच्या बांगड्या ;भाजक्या मातीची कर्णभूषणे ; आणि वेगवेगळ्या प्रकाराच्या मण्यांच्या माळा - पांढरे पट्टेरी अ‍ॅगेट, केशरी कार्नेलियन, दुधाळ पांढरा चाल्सीडोनी, पारदर्शक स्फटिक, लालसर/हिरवा जास्पर, हस्तिदंत, सोनं, तांबं, माती, शंख असे किती किती मणी उत्खननांमधून मिळालेत.
उपजीविकेसाठी शेती, पशुपालन, मासेमारी, शिकार, याच्याच जोडीला जंगलातून विविध गोष्टी गोळा करून आणणं (foraging) असे वेगवेगळे मार्ग हे लोक अवलंबत असत.
आपल्याला पुरावा पाहून आश्चर्य वाटतं पण ४००० वर्षांपूर्वीच दख्खनच्या पठारावर खरीप आणि रब्बी पिकं घ्यायला सुरुवात झाली होती. विविध प्रकारची धान्यं, डाळी, कडधान्यं, तेलबिया यांचा समावेश यात होता. गहू, जव, तांदूळ, नाचणी, ज्वारी, बाजरी, राळं, मसूर, हरभरा, तूर, मूग, उडीद, कुळीथ, वाटाणा, वाल, अळशी, तीळ ही पिकं नियमितपणे घेतली जात होती. गव्हासारख्या पिकाला पाणी लागतं म्हणून इनामगावच्या लोकांनी नदीच्या पाण्याचा कालवा/ पाट काढून पुराचं जास्तीचं पाणी शेतीला मिळावं असी व्यवस्था केली होती.
शेतीसाठी वापरात आणलेली काही अवजारंही आपल्याला उत्खननात मिळाली आहेत. यात हरणाच्या शिंगापासून (antlers) बनवलेले छोटे नांगर, बैलाच्या खांद्याच्या हाडापासून बनवलेलं छोटं नांगराचं काम करणारं पातं, तसंच हरणाचं शिंग पोकळ करून त्यातून पेरणी करताना बिया सोडण्यासाठी केलेलं seed drill (याला मराठीत काय म्हणतात बरं?) यांचा समावेश आहे.
antler hoe.jpgseed drill.jpg
पाळीव प्राण्यांमधे गाय-बैल, म्हशी, शेळ्यामेंढ्या, गाढवं, कोंबड्या, डुकरं, आणि कुत्री, मांजरं यांचा पुरावा आढळतो. घोडा आढळतो पण तो अगदी शेवटच्या कालखंडात (बहुदा दक्षिण भारतातल्या लोहयुगीन लोकांच्या संपर्कामुळे).
शिकार करून आणलेल्या प्राण्यांची यादीही अशीच लांबलचक आहे - ८/९ जातींची हरणं, रानडुक्कर, नीलगाय, अस्वल, माकड, वाघ, बिबळ्या, मुंगूस, ससा, रानमांजर, कोल्हा, लांडगा, साळिंदर, घोरपड, खार, मगर, कासव, मोर, माळढोक, कबुतर, बदक, खेकडे, मासे, इ.
या लोकांच्या आहाराचा मुख्य घटक हा गोमांस होता. त्याच बरोबर इतर प्राण्यांचेही मांस, मासे, धान्य, कडधान्य हे होतंच. याचबरोबर वस्तीच्या आसपास सहज उपलब्ध होणारी फळं (बोरं, जांभळं, आवळे, शिंदीचा खजूर, चारोळ्या) पालेभाज्या (चाकवत, घोळ, मेथी) यांचाही समावेश खाण्यात होत असणार असं पुरावनस्पतिशास्त्रीय पुरावा आपल्याला सांगतो.
या सगळ्या रोजच्या उद्योगांशिवाय काही कारागिरीची कामंही केली जात. यात प्रामुख्याने कुंभार, तांबट, मणिकार, लोणारी (चुना तयार करणारा), अशा कारागिरांचा समावेश होतो. दगडांची हत्यारं बहुतेक सर्व कुटुंबं आपापलीच बनवत.
हे सर्व 'कुटिरोद्योग' ज्याच्यात्याच्या घरातच चालत. त्याच्यासाठी वेगळं वर्कशॉप वगैरेची भानगड नव्हती.
इनामगावच्या उत्खननात एक फार सुंदर कुंभाराचा आवा मिळाला. त्यात जास्तीची गरम हवा निघून जाण्यासाठी, इंधनासाठी वेगवेगळ्या वाटा केलेल्या होत्या. या भट्टीमधे ६००-७०० डिग्री सेंटीग्रेड तापमान कायम ठेवून छान खणखणीत गाडगी भा़जली जात. अशा प्रकारच्या भट्ट्या आणखीही असणार हे सरळ आहे. पुरावा म्हणजे ढिगाने सापडणारी खणखणीत वाजणारी रंगीत नक्षीदार खापरं!
kiln.jpg
आणि इतकंच तापमान, नियंत्रित करून हवा तितका वेळ ठेवल्याशिवाय तांबं तरी कसं गाळणार? तांबं देखील छोट्या भट्ट्यांमधे गाळलं जायचं. अशुद्ध गाळ एकीकडे तर शुद्ध रस खापराच्या मुशीत!
एकूणच ही गावं उपजीविकेच्या प्राथमिक पातळीवर तरी स्वयंपूर्ण होती. असं असलं तरीही खिल्लारं आणी शेळ्यामेंढ्या घेऊन निदान काही लोक तरी वर्षातील काही काळ चराऊ कुरणांच्या मागे भटकत असणार. कारण उपजीविकेच्या दृष्टीने फक्त वस्तीच्या आसपासच्या पर्यावरणाचा सतत उपभोग घेऊन त्या संसाधनांवर ताण पडू नये म्हणून बहुतेक प्राचीन समाज असा 'भटका' मार्ग स्वीकारत. चराऊ कुरणांच्या जवळ सापडलेल्या अनेक हंगामी छोट्या वस्त्या याचंच निदर्शक आहेत. शिवाय सामाजिक नातेसंबंध वाढवायचे असतील तर आसपासच्या समाजाशी कायमस्वरूपी संपर्क ठेवण्याची गरज असते.
या परस्पर संबंधांचा आणखी एक पुरावा म्हणजे दूरदूरच्या प्रदेशांतून आयात केलेल्या गोष्टी. या दख्खनच्या पठारावर रहाणार्‍या ताम्रपाषाणयुगीन लोकांचे अनेक प्रदेशांशी देवाणघेवाणीचे संबंध होते. उत्खननात सापडलेल्या खालील गोष्टींची यादी पुरेशी बोलकी आहे:-
तांबे (राजस्थान/गुजरात); शंख (गुजरातचा समुद्रकिनारा); सोनं (कोलार/हट्टी खाण?) सर्पंटाईन, अ‍ॅमेझोनईट हे दगड (अनुक्रमे कर्नाटक व गुजरात), हस्तिदंत (कर्नाटक?), इ.इ.
दळणवळणाची साधनं म्हणजे बैलगाड्या आणी होड्या (निदान मोठ्या नद्यांसाठी तरी) हे नक्की आहे. कारण चक्क त्यांची चित्रंच सापडली आहेत मातीच्या भांड्यांवर! शिवाय इनामगावला नदीकाठी एक छोटासा धक्काही मिळाला उत्खननात.
रांजणावर बैलगाडीचे रेखाचित्र
cart.jpg
हे झालं रोजच्या जगण्याबद्दल, पोटाची खळगी भरण्याबद्दल! पण त्यापलिकडे त्यांचं आयुष्य कसं होतं? सुरुवात करूयात त्यांच्या श्रद्धा-समजुतींपासून (इथे 'धार्मिक' हा शब्द मी मुद्दाम टाळलाय - कारण या समाजाचे वैदिक किंवा तत्सम known धर्माशी कुठलेही नाते नाही).
हे लोक मृतांचे दफन करत. ते ही वेगळ्या स्मशानात नव्हे तर घराच्या/ अंगणाच्या जमिनीत खड्डा करून. (फक्त बहाळ या गावाला नदीपल्याड वेगळं स्मशान होतं). मोठ्या (adult) व्यक्तींचे दफन खड्डयात झोपवून केले जाई तर लहान मुलांचे दफन दोन मोठे रांजण तोंडाला तोंड लावून तयार झालेल्या बंद जागेत मृतदेह ठेवून केले जात असे. मोठ्या माणसांचे पाय घोट्यापासून कापले जात ('त्या' जगातून परत इकडे येऊ नये म्हणून?). शिवाय त्याचा/तिचा अनंतातला प्रवास सुखाचा व्हावा यासाठी काही निवडक भांडी (आत कदाचित खाद्यपदार्थ असावेत) त्या दफनात ठेवली जात. शिवाय मृताच्या शरीरावर माळ, बांगड्या इ. अलंकारही असत.
burial.jpg
बाकी त्यांच्या दैवत संकल्पनेविषयी सलग सुस्पष्ट पुरावा नाही. पण विविध प्रकारच्या स्त्री मृण्मूर्ती मिळतात. तेव्हा स्त्रीतत्त्वाची/ सुफलनाची संकल्पना इतर कुठल्याही आदिम समाजाप्रमाणेच इथेही महत्त्वाची असणार यात नवल नाही. शिवाय गुजरात, राजस्थान, माळवा इथल्या ताम्रपाषाणयुगीन समाजांप्रमाणेच इथेही बैलाच्या छोट्या मृण्मूर्ती अनेक मिळाल्यात. बैल कदाचित पुरुषतत्त्वाशी, शेती - समृद्धी या संकल्पनांशी निगडित असावा. इनामगावात एका घराच्या जमिनीखाली एका कच्च्या मातीच्या छोट्या डबीत एक शिरोहीन स्त्री मूर्ती व बैलाची मूर्ती मिळाली. ही निश्चितच कुठल्यातरी धार्मिक विधीशी संबंधित असणार पण आता तो तपशील आपल्यासाठी कायमचाच हरवून गेला आहे. याशिवाय एका मोठ्या रांजणावर एक अर्धा माणूस आणि कमरेखालचा भाग एका वन्य प्राण्याचा (बहुदा बिबळ्या) अशीही एक आकृती आढळते. याचाही संबंध त्यांच्या कुठल्या समजुतीशी असावा असा अभ्यासकांचा कयास आहे.
अग्निपूजेचाही एक पुरावा मिळतो दायमाबादमधे. तिथे काही खड्ड्याच्या स्वरूपातली अग्निकुंडे मिळाली आहेत. आणी त्यात जळालेली गाई-बैलांची हाडे व धान्याचे दाणे सापडले आहेत.
हे लोक मातृसत्ताक होते की पितृसत्ताक हे समजायला मार्ग नाही, पण ज्याला मानववंशशास्त्रात tribal म्हणतात तसे होते. म्हणजे कुटुंब आणि कुल (clan) यांच्या सामाजिक चौकटीतच वावरणारे. उपलब्ध पुराव्यावरून तरी यांच्यात सामाजिक विषमता होती, वर्गभेद होता असं दिसत नाही. शहरीकरणाच्या आधीच्या या संस्कृतीत राज्यसंस्था, राजेपद असंही काही असावं असं दिसत नाही. गावाचा कारभार गावप्रमुख पहायचा. त्याचा दर्जा साहजिकच इतरांपेक्षा थोडा वरचा किंवा वेगळा. इनामगावच्या उत्खननात मिळालेलं गावप्रमुखाचं घर ४-५ खोल्यांचं होतं पण याशिवाय त्या घरातून इतरांपेक्षा वेगळी अशी कुठलीच वस्तू मिळाली नाही. फरक होता तो दफनांमधे. या घरातून मिळालेली दोन पुरुषांची (बहुदा लागोपाठच्या पिढ्यांमधली) दफने ही इतरांसारखी खड्ड्यात झोपवून नव्हे तर ४ पायांच्या साठवणीच्या रांजणाचा वापर खुर्चीसारखा करून त्यात मृतदेहाला मांडी घालून बसवून केली होती. शिवाय या मृतदेहांचे पाय कापण्यात आले नव्हते! आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे गावचं धान्यकोठार या घराच्या मागच्याच बाजूला होतं. बहुदा त्याची देखरेख आणि नियंत्रण हा गावचा प्रमुख करत असावा. (या अशा सामाजिक रचनेला इंग्लिश्मधे chiefdom असं म्हणतात).
chief.jpg
हे असे समाज भारतात इतर प्रदेशातही होते. हळूहळू यांना लोहतंत्रज्ञानाचा शोध लागला आणि इ.स. पूर्व ५-६व्या शतकानंतर येणार्‍या शहरीकरणाकडे त्यांची वाटचाल सुरू झालेली दिसते. अगदी विदर्भातही असाच सांस्कृतिक कालानुक्रम आढळतो. पण दख्खनच्या पठारावर मात्र काही वेगळंच घडलं!
इ.स.पूर्व १२०० -१००० च्या दरम्यान तापी, गोदावरी-प्रवरा खोर्‍यातल्या वसाहती उजाड झाल्या. पुढे अगदी इ.स.पूर्व ३-४थ्या शतकांपर्यंत या भूप्रदेशात मनुष्यवस्तीचा पुरावा संशोधकांना मिळालेला नाही. हे काय गौडबंगाल आहे? याचं उत्तर थोड्याफार प्रमाणात दिलं इनामगावच्या उत्खननाने. तापी, गोदावरी खोर्‍यांमधे न आढळणारी पण फक्त भीमेच्या खोर्‍यातच आढळणारा ताम्रपाषाणयुगाचा शेवटचा कालखंड इथे तपशीलवार अभ्यासला गेला.
अभ्यासकांच्या मते राजस्थानातील पुरापर्यावरणाच्या अभ्यासावरून असं दिसतं इ.स.पूर्व १२००-१००० च्या सुमारास पश्चिम भारतातील हवामान आणखी शुष्क व्हायला सुरुवात झाली. पर्जन्यमान घटलं आणि पाऊस आणखी बेभरवशाचा झाला. वारंवार दुष्काळही पडू लागले असावेत. या सगळ्याचा परिणाम मानवसमूहांवर झाला नसता तरच नवल!
इनामगावचा पुरावा असं दाखवतो की अचानक याच सुमारास लोकांच्या राहणीमानात बदल झाले. चौकोनी घरं सोडून आता हे लोक गोल झोपड्या बांधून राहू लागले. दफनंसुद्धा थोडी घाईगडबडीत उरकली जाऊ लागली. शेतीतही मोठे बदल झाले. गव्हाचं पीक आता कोणी घेइनासं झालं. जव, नाचणी यासारख्या तुलनेने कमी पाण्यात, पटकन होणार्‍या आणि फारसा खटाटोप न करता साठवता येतील अशा पिकांचं प्रमाण खूप वाढलं. जास्त पाणी, चारा लागणार्‍या गाईगुरांची खिल्लारं कमी होऊन शेळ्यामेंढ्यांचं प्रमाण वाढलं. आहारात गोमांस कमी होऊन काळविटाचं मांस हा सगळ्यात महत्त्वाचा घटक ठरला. खापरांवरची नक्षी खूपच कमी झाली आणि त्यांचा पोत खरखरीत झाला. भाजणीही आता तितकीशी उत्तम राहिली नाही. एकूणच रोजच्या जीवनातला तणाव वाढलेला दिसतो. खायचीप्यायची भ्रांतही अधूनमधून पडत असावी कारण एका कुत्र्याचाही समावेश आहारात केल्याचा पुरावा इनामगावात मिळाला आहे.
या सगळ्या पुराव्याचं विश्लेषण करून अभ्यासकांनी असं दाखवून दिलं की इतकी शतकं एक स्थिरस्थावर जीवन जगणारे हे महाराष्ट्राचे आद्य शेतकरी या अस्मानी संकटांशी झगडता झगडता टेकीला आले आणि नाईलाजाने आपल्या उपजीविकेचे मार्ग त्यांनी बदलले.
आजही जिथे अतीव दुष्काळात महाराष्ट्रातील शेतकरी घरदार, खिल्लार सोडून केवळ जगण्यासाठी वाट फुटेल तिथे जातो, वेळप्रसंगी शहरात भीकसुद्धा मागतो, तिथे अशा 'जास्तीच्या' लोकांना सामावून घेणारी शहरीकरणाची आर्थिक यंत्रणा नसताना या शेतकर्‍यांनी तरी काय करावं? मग संस्कृतीचं चक्र 'उलटं' फिरलं! परत एकदा स्थिर शेतीकडून हे लोक अर्ध-भटक्या (semi-nomadic) पशुपालन आणि शिकारीच्या जीवनाकडे वळले.
इनामगावसारख्या गावात कायमचे स्थायिक असलेले लोक जगायला बाहेर पडले आणि मग अधूनमधून काही काळच मुक्कामासाठी परतू लागले. हळूहळू हेही कमी झालं. मग इ.स. पूर्व ८व्या शतकात कधीतरी एकदा गावातून निघालेली कुटुंबं, त्यांच्या पुढच्या पिढ्या कधीच परतून आल्या नाहीत. पोटापाण्यासाठी भटकत कुठे दूर देशी गेले कुणास ठाऊक! त्यांची घरं मात्र तशीच त्यांची वाट पहात राहिली. कायमची.
इनामगावची आणि दख्खनच्या पठारावरच्या आदिम वसाहतींची गोष्ट पुरातत्त्वासाठी इथेच थांबते. पुढे आणखी ४००-५०० वर्षे कुठल्याही वसाहतींचा पुरावा आपल्याला अजून मिळत नाही. मग एकदम सातवाहन कालाच्या थोडं आधीपासून परत एकदा सगळीकडे गावं वसलेली दिसतात. प्रकाश, नेवासा अशा ताम्रपाषाणयुगीन वसाहतीही परत एकदा माणसांच्या वास्तव्याने नव्याने फुलून उठतात. (इनामगाव, दायमाबाद, सोनगाव मात्र परत कधीही कुठल्याही कालखंडात 'जिवंत' झाली नाहीत). सातवाहनांच राजकुल उदयाला येतं आणि दख्खनच्या पठाराचा लिखित इतिहासकाल सुरू होतो.
या ताम्रपाषाणयुगीन लोकसमूहाचे वंशज निश्चितच याही इतिहासकालाचा अविभाज्य भागच असणार. पण आजतरी आपल्यासाठी त्यांची ही ओळख ही एक गुपितच आहे.
कुणी सांगावं? माझ्या आणि माझ्यासारख्याच आणखी काही वेड्या संशोधकांच्या हाताला कधीकाळी तरी यश येईल, आणि मधले दुवे जुळवणारे पुरावे सापडतील. इनामगावची गोष्ट पूर्ण तर केली पहिजे ना.... या जन्मी नाही तरी पुढच्या जन्मी!! ताजा कलमः मायबोलीवरच लिहिलेल्या अन्य एका लेखातली माहिती इथे अपडेट करून पुरवणी जोडते आहे - भीमेच्या खोर्‍यातून या अंतकाळाचे फारसे पुरावे हाताला लागले नसले तरी कृष्णेच्या खोर्‍यातील सुपीक, बारमाही पाणी आणि उत्तम पावसाच्या प्रदेशातून (वारणा-मोरणेच्या संगमाजवळ) उत्तर जोर्वेकालीन वसाहती उजेडात आल्या आहेत. त्यामुळे दुष्काळ --> भटके जीवन हे गृहितक सगळ्याच वसाहतींना सरसकट लागू पडते का हा कळीचा प्रश्न परत एकदा ऐरणीवर आला आहे. एकुणातच या अंतकालाचा नव्याने पुरावे शोधून साकल्याने फेरविचार करायची गरज आहे हे माझे मत मला परत एकदा 'पुराव्याने शाबित' करून अधोरेखित करता आले आहे. 
And the Quest goes on....
संदर्भः
वरील लेखात उल्लेखलेल्या सर्व पुरातत्त्वीय स्थळांचे उत्खनन अहवाल
नकाशे आणी प्रकाशचित्रे -उत्खनन अहवाल व 'First Farmers of the Deccan' - M. K. Dhavalikar

  वरदाने वरवंटा म्हणून गुळगुळीत दगडाचा उल्लेख केलाय. केनयात पुर्वापार बदामाच्या आकाराच्या पण जाड ओबडधोबड आकाराचा दगड वापरला जातो. त्यांचा पाटा आपल्यासारखाच म्हणजे आयताकृति असतो पण त्याच्या कडा जरा उंच असतात. म्हणजे वाटायचा पदार्थ खाली सांडणार नाही, याची सोय. (आपल्याकडे ती का नव्हती ?)
या बदामाकृति वरवंट्याची खासियत म्हणजे तो निमुळत्या बाजूकडून हाताने धरायला सोयीचा असतो. असा धरला कि रुंद बाजू खाली येते आणि तिचा वापर करुन वाटायचे.
यांचे वाटण म्हणजे मसाले वा नारळ नसतात. तर जास्त करुन, मक्याचे दाणे वा नाचणी असते. कोरडे दाणे वाटायला हे डि़झाईन अगदी योग्य ! याच दगडाने भुईमूगाच्या शेंगा सोलणे पण सोयीचे जाते.
यांच्या जेवणात रताळी, अरारुट, केळी आदी उकडून, कुस्करुनही वापरतात. त्यासाठी मात्र लाकडी खलबत्ता असतो. तो एकाच लाकडातून कोरून केलेला असतो.

हा लेख फार संक्षिप्त स्वरूपात लिहिलाय म्हणून पाट्याबद्दल फार लिहिलं नाही. पण या काळातील पाट्याचा मध्य खोलगट असल्याने सांडासांडीची काही भानगड नव्हती. तो थोडासा खोगिरासारखा दिसे म्हणून त्याला इंग्लिशमधे saddle quern म्हणतात. आणी वरवंटा म्हणजे गुळगुळीत दगड असं जरी म्हटलं असलं तरी तो काही नर्मदेतल्या गोट्याएवढा नव्हे काही. बरेच वेळा तो एका बाजूने पक्का धरता येईल असा थोडासा निमुळता असे.
आज आपण जसे पाटे वापरतो तसे पाटे सातवाहन कालापासून वापरात आले.
मेधा, या लँडफिल्सची आर्किऑलॉजी फार पूर्वीच झालीये. १९९० च्या दशकात. garbage archaeology, william rathje असा गूगल ला सर्च देऊन बघ. त्यांनी नॅशनल जिओग्राफिक मधेही सर्वांना समजेल असा लेख लिहिला होता. खूप प्रसिद्धी मिळाली होती या कामाला.


या लेखातल्या एकेका मुद्याबाबत सविस्तर वाचायला आवडेल. या विषयावर मराठीत फारच कमी वाचलय.
उदा. या चुलीबाबतच. असे चारीबाजूने उघडे डिझाईन म्हणजे, भांड्याला सगळीकडून उष्णता मिळणार. थडी असेल तर पुरा निवारा उबदार राहणार. पण अशी चूल खोलीच्या मधेच करावी लागणार. भिंतीलगत असू शकणार नाही. मग वार्‍यापासून आडोसा कसा करणार ?

पूर्वी महाराष्ट्राला दक्षिणापथ म्हणत होते म्हणे. ते कधी?
दक्षिणापथ म्हणजे नर्मदेच्या दक्षिणेकडील सर्व भूभाग. हे नाव आपल्याला पहिल्यांदा मौर्यकाळात आढळते.

इसपु १२०० च्या सुमारास महाराष्ट्रात दुष्काळ पडले याचे वेगळे पुरावे आहेत का?
द्रविडीयन लोकांबरोबर महाराष्ट्रीयन लोकांचा संबंध केंव्हा आला?
रामटेक भागात इतक्यात काही उत्खनने सुरु आहेत ती बरीच अलिकडची का?
सध्या महाराष्ट्रात कुठे सुरु आहेत उत्खनने?
जो काही तुरळक/तुटपुंजा माहितीसमुह उपलब्ध आहे त्याच्या सहाय्याने अर्वाचीन प्रकारचे तक्ते पहायला आवडतील - उदा. गव्हाचे उत्पादन (as a function of time), घराचे क्षेत्रफळ, गावांच्या लोकसंख्या. अशा दृष्टीने काही उपलब्ध आहे का?

 दुष्काळ या मुद्यावरून खूप वाद झडलेत Deccan chalcolithic (म्हणजे हे दख्खनच्या पठारावर रहाणारे ताम्रपाषाणयुगीन समाज) च्या विषयात.
मुळात दख्खनच्या पठारावर असं पुरापर्यावरणीय काम झालंच नाहीये. तर मग राजस्थानचा पुरावा सगळीकडे तेवढाच ग्राह्य धरता येईल का यावर तज्ज्ञांमधे मतभेद आहेत. शिवायही आणखी controversies आहेत, ज्या टाळून मी इथे एका सर्वसाधारण पातळीवर एक गोषवारा लिहिलाय.
शिवाय जर दुष्काळामुळे या वसाहती उजाड झाल्या तर मग फारसं वेगळं पर्यावरण नसलेल्या द्क्षिण भारतात असं का झालं नाही? हा प्रश्नच आहे!! अर्थात राजस्थानचा पुरावा, आणी इनामगाव मधला सांस्कृतिक/आर्थिक बदल या परिस्थितीजन्य पुराव्यामुळे सध्यातरी आपल्याला अभ्यासकांचे म्हणणे मान्य करावे लागते.
हा दुष्काळ पडला होता का? त्याचा कुठे किती जोर होता? मग वेगवेगळ्या प्रदेशात मानवसमूहांनी याला वेगवेगळ्या उपायांनी तोंड दिले का? असे खूप म्हणजे खूप प्रश्न आहेत. याच्यासाठी एक बर्‍यापैकी मोठा संशोधन-प्रकल्प हातात घ्यावा लागेल. शिवाय याला तेवढाच भक्कम आधार लागेल तो कालमापन पद्धतीचा. भारतात ही एक मोठी अडचण आहे. प्रकल्पाच्या पैशातून बाहेरच्या देशात नमुने पाठवायला तेवढे पैसे असतातच असं नाही. आणि भारतातल्या प्रयोगशाळांमधे लांबच्या लांब प्रतीक्षायाद्या असतात. हे फक्त साध्या कार्बन-१४ बद्दल झालं. TL Dating बर्‍यापैकी बेभरवशी असतं, कारण त्याच्या नमुने गोळा करण्यापासून काय पथ्य पाळायची याच्या हजार भानगडी असतात. AMS dating पण खूप कमी ठिकाणी उपलब्ध आहे, शिवाय या सगळ्या मोठ्या संस्थांची स्वतःची शास्त्रीय कामं चालू असतात. त्यात पाहुण्या पुरातत्त्वीय नमुन्याला मागच्या बाकावर बसवलं जातं. शिवाय पूर्वी चालत असे, पण आता एकच तारीख मिळून चालत नाही. you need to have series of dates to make your chronology acceptable on international level.. इथे उत्खनन करण्यासाठी पैसे मिळवायला झगडावं लागतं, तर हे पुढचे विचार कोण करणार? शिवाय प्रत्येक जण आपापल्या आवडीनुसार काम करत असतो/ते. आत्ता या दख्खनच्या ताम्रपाषाणयुगावर माझ्याशिवाय कुणीच काम करत नाहीये!
द्रविडीयन/ दक्षिण भारतीय समाजाशी संपर्क असल्याचा पहिला पुरावा याच काळात मिळतो - विशेषतः कर्नाटकाबरोबर.
विदर्भाचा सांस्कृतिक कालानुक्रम ताम्रपाषाण, लोहयुग आणि इतिहासकाल असा सलग आहे.
तुम्ही म्हणता तसे अर्वाचीन तक्ते करायचे प्रयत्न झालेत या संस्कृतीबाबत. पण इथे किती लिहू? म्हणून खूप मुद्यांना काट मारली आहे.. खरं तर पूर्ण भारतात सिंधू संस्कृतीच्या खालोखाल जर सर्वोत्तम संशोधनकार्य झालं असेल तर या संस्कृतीविषयी झालंय. अगदी आंतरराष्ट्रीय पातळीवरही इनामगावचं उत्खनन भारतातलं सर्वोत्कृष्ट शास्त्रीय उत्खनन म्हणून प्रसिद्ध आहे. पण मराठीत याविषयी अत्यल्प लिखाण उपलब्ध आहे. म्हणूनच याची तोंडओळख करून द्यायचा खटाटोप केलाय. हे संशोधन माझ्या मराठीपणाचा एक महत्त्वाचा अभिमानबिंदू आहे!
माझ्या दुर्दैवाने मी विद्यार्थी म्हणून पुरातत्त्वात पाऊल टाकण्याआधीच ही सर्व उत्खनने संपली.. मी मात्र सर्वेक्षण करून या नाहीशा झालेल्या लोकांचा 'माग काढण्याचं' काम पूर्वीच हाती घेतलंय. निदान पुढच्या २० वर्षात तरी आणखी काहीतरी मिळावं, कुठलंतरी उत्तम उत्खनन करावं आणि या प्रश्नाचं उत्तर देता यावं अशी मनापासून इच्छा आहे. 


ही उत्खनन स्थळे पहायला फारशी अडचण नाही. फक्त आता तिथे काही दिसण्यासारखं नाही. पांढरीवर पडलेल्या खापरांशिवाय..
दायमाबाद पुणतांब्याजवळ आहे. त्याचा काही भाग संरक्षित आहे. इनामगाव पुणे - शिरूर रस्त्यावर न्हावरे गावाचा एक फाटा लागतो उजवीकडे, तिथे आत न्हावर्‍यापासून ४ किमी घोडनदीच्या काठावर आहे. गावापासून पांढर आणखी ३किमी उत्तरेला नदीकाठाला आहे. सोनगावची पांढर आता बहुदा पूर्णपणे गेली असणार - नीरा, कर्‍हा संगमाच्या बेटावर सोमेश्वर मंदिराच्या अगदी मागेच होती. पूर्वी ती जमीन फलटणच्या निंबकरांचं रान/ गवळी राजाचं टेकाड म्हणून माहित होती आसपास. प्रकाशला मीच गेली नाहीये अजून. पण तिथली पांढर अगदी मराठा काळात येऊन संपते त्यामुळे हे अवशेष वरती किती दिसतात माहित नाही. वाळकी, थेऊर, इ. चे मात्र आता नामोनिशाणही नाही... आताच्या कुठल्याही ग्रामस्थांना या ठेव्याची जाण असेल असं वाटत नाही. फक्त इनामगावला मध्यंतरी ग्रामस्थ साईट म्युझियम करणार असं ऐकत होते. पुढे काय झालं खरंच माहित नाही..

कालच्याच वाचनातील संदर्भ आठवला.
१. 'बॉर्न इन आफ्रिका' या पुस्तकाचा परिचय वाचला इंडियन एक्स्प्रेसच्या आय या साप्ताहिकीमध्ये. त्यातील काही उल्लेख रोचक होते. परिचयातील मजकुरानुसार हे पुस्तक म्हणते की, 'होमो सॅपियन्स आफ्रिकेतून सव्वालाख वर्षांपूर्वी बाहेर पडले. पण त्यांचा नैसर्गीक परिस्थितीमुळे पराभवच झाला. मग बराच काळ आफ्रिका हेच मानवी संस्कृतीचं पाळणाघर राहिलं.' हे मानवाचे पहिले स्थलांतर मानले जाते. तो मानवही माझे चुकत नसेल तर आदिमानव अशा अवस्थेतील मानवच होता. तुमच्या या लेखात म्हटले आहे की, 'महाराष्ट्रात आदिमानवाचा वावर सुमारे ७ -८ लाख वर्षांपासून होता असे दिसून येते. हा अश्मयुगीन मानव समाज भटका आणि शिकारी असल्याने त्याच्या घराबिरांचे अवशेष मिळणार नाहीत हे उघडच आहे. आपल्याला मिळतात ती फक्त त्यांनी बनवलेली दगडांची हत्यारं. अशी ७ लाख वर्षांपूर्वीची प्राचीन हत्यारं सापडली आहेत मोरगाव (हो, गणपतीचं मोरगाव!), जुन्नरजवळ बोरी आणि नेवाश्याजवळ चिरकी नाला (अंदाजे ३.५ लाख वर्षं) येथील उत्खननात.'
माझा यामुळं संभ्रम झाला आहे. आप्रिकेतून माणूस बाहेर पडण्याच्या प्रचंड कालखंड आधी इथे माणूस होता, असे मानले/असले तर एकूणच त्या उपपत्तीला आव्हान मिळते आहे.
२. शेतीच्या तंत्रज्ञानाच्या उदयासंबंधात तुम्ही म्हटले आहे की, 'भारतात शेतीच्या तंत्रज्ञानाचा उगम कमीतकमी ३ ठिकाणी स्वतंत्रपणे झाला असं आता संशोधकांना मान्य आहे. यातील एक केंद्र बलुचिस्तान प्रांत (ई.स. पू. ६०००) - ज्यातून पुढे सिंधू संस्कृती उदयाला येण्यास हातभार लागला, दुसरे विंध्य - कैमूर पर्वतातील अलाहाबाद आणि गंगा यामधला बेलन खोर्‍याचा भाग (ई.स. पू. ६००० - ७०००) आणि तिसरे ईशान्य भारत.' येथे नर्मदेच्या खोऱ्याचा उल्लेख येत नाही. मी असं ऐकलं आहे की, नर्मदेच्या खोऱ्यात भारतीय उपखंडातील शेतीचा आरंभ झाला.
मी या विषयाचा विद्यार्थी नाही. अभ्यासक/संशोधक तर नाहीच नाही. त्यामुळंही संभ्रम असण्याची शक्यता आहे. वरच्या दुसऱ्या मुद्यात तर माझी माहितीही चुकीची असण्याची शक्यता आहे. पण नेमके काय असावे याविषयेची कुतूहल जागे झाले आहे.


हे प्रश्न तुम्हाला पडणे स्वाभाविक आहे, कारण आउट ऑफ आफ्रिका हा अनेक लोकांचा आवडता सिद्धांत आहे. अगदी कट्टर पुरातत्त्वशास्त्रज्ञ सोडून. पूर्वी आफ्रिकेइतकी प्राचीन प्रागैतिहासिक स्थळे बाहेर मिळत नव्हती त्यामुळे असा एक समज होता की आफ्रिकेतूनच आदिमानव सर्वत्र पसरला. पण मग नंतर जसजसे इतर देशातील पुरावे मिळत गेले तसे या सिद्धांताला तडा गेला. अजूनही सर्वात प्राचीन आदिमानव आफ्रिकेतच आढळतो. पण जगात इतर खंडांमधे आदिमानवाचा उगम स्वतंत्रपणे झाला हे सिद्ध झालंय. (आदिमानवातही भरपूर 'जाती-जमाती' (i.e. species variation) होत्या). अगदी याच वर्षी भारतातल्या आदिमानवाचा पुरावा आणखी मागे गेलाय. आता १५ लाख वर्षांपूर्वी आदिमानवाचे अस्तित्व तमिळनाडूत होते हे आपल्याला कळलंय.
सध्याच्या आउट ऑफ आफ्रिका वाल्यांचं म्हणणं असं आहे की सव्वा लाख वर्षांपूर्वी बाहेर पडलेले होमो सेपिअन्स हे जगभरात पसरले आणि 'स्थानिक आदिमानवांबरोबर मिसळले'. विशेषतः जिनोम रीसर्च वाल्यांचं हे लाडकं मॉडेल आहे. अजूनही खरंखोटं काहीच सिद्ध झालेलं नाही. आणि सगळ्यांनाच हे मान्य आहे असंही नाही. तुम्ही विकिपेडीआवर human evolution, recent african origins of modern humans या एन्ट्रीज वाचा..
नर्मदा खोर्‍याबद्दल-- हा फार जुना मतप्रवाह होता, आणी तो ही बरोबर नव्हता. पुरातत्त्व हे नित्य नूतन संशोधनाने सतत updating होणारं शास्त्र आहे. त्यामुळे कालचा पुरावा सुद्धा आज ग्राह्य असतोच असं नाही... 
प्रकाश काळेल,
मराठी शब्द सांगितल्याबद्दल धन्यवाद. हा सरसकट वापरला जाणारा शब्द आहे की एखाद्या प्रदेशात?
स्वाती आंबोळे,
महाराष्ट्रात दहनाची पद्धत सुमारे २००० वर्षांपूर्वी (सातवाहन कालाच्या आसपास झाली असावी..

> पण मग नंतर जसजसे इतर देशातील पुरावे मिळत गेले तसे या सिद्धांताला तडा गेला.
> पण जगात इतर खंडांमधे आदिमानवाचा उगम स्वतंत्रपणे झाला हे सिद्ध झालंय.
> आता १५ लाख वर्षांपूर्वी आदिमानवाचे अस्तित्व तमिळनाडूत होते हे आपल्याला कळलंय.
तमिळनाडूची लिंक ईंटरेस्टींग आहे. ती अवजारे होमो ईरेक्टसची आहेत जो अफ्रिकेतुन १८ लाख वर्षांपुर्वी बाहेर पडला असे समजल्या जाते.
वेळ मिळाला की पहिल्या दोन वक्तव्यांबद्दल अजुन सांगणार? अफ्रिकेतच पहिला मानव निर्माण झाला असेल किंवा तिथुनच पसरला असेल असे नाही, पण ज्या ट्रेट्स मानवाला इतर प्राण्यांपासुन वेगळे करतात (मुख्यतः बाह्य जगाच्या मॉडेल मध्ये स्वतःला समभुत करायचे) या उत्क्रांत होणे सहज नाही. त्याकरता म्युटेशन्सचा कोणतातरी एक जथ्था एकत्र यावा लागला असेल. ते दोनदा झाले असल्याची शक्यता एकदा होण्यापेक्षा अर्थातच कमी आहे (पण दहा-पंधरा लाख वर्षे उपलब्ध असल्याने अशक्यही नाही).
सर्व अफ्रिकेत्तर पुरुषांमधे एक विविक्षीत म्युटेशन आढळते त्यावरुन अजुनही out of Africa पुर्णपणे मोडीत नाही काढल्या जात. पुरातत्वनुषंगाने जास्त वाचायला नक्कीच आवडेल.

चुलींबद्दल आणखीही बर्‍याच गोष्टी आहेत. पण फार तपशीलात जायचा मोह टाळला. नाहीतर एक आख्खं पुस्तक लिहावं लागेल!! फिदीफिदी
<<
झालं की नाही लिहून पुस्तक?
लिहा. आवडेल वाचायला.
तुम्ही दिलेला पहिला नकाशा आहे ना तो?
तिथे तापीच्या वरच्या अंगाला जी स्थळं आहेत,(प्रकाशे या गावावर ४ ठिपके दिसतात) तिथे बर्‍याच कुलांच्या कुलदेवता आहेत.ही सगळी गावे अत्यंत आडमार्गाला आहेत. कित्येक "देवळे" गेल्या २०-३० वर्षांत बांधलेली. पूर्वी फक्त झाडाखाली दगड अशी. पुजारीही भिल्ल. असे का? इथे कुलदैवत. म्हण्जे कुलाचे मूळ कुटुंब इथे राहिलेले. मग हे गांव इतके मागास कसे? मागे यासंदर्भात विचार करताना थोडी नेटाने माहिती शोधली तर ताम्रपाषाण युगापासून इथे वस्ती असल्याची माहिती मिळाली. मग अगदी ग्याझेटापर्यंत येऊन सूरत ते बर्‍हाणपूर रस्ता कसा तेही वाचून काढले होते.
माणूस वसला तो नद्यांच्या काठाने. काळीवर शेती केली, अन पांढरी (उपजाऊ नसलेली जमीन) वर घरे बांधली, स्मशान या अर्थी पांढरी शब्द वापरताट. याच गांवची काळी अन इथेच पांढरी.. फार इंटरेस्टिंग आहे हे सारं.
(चिनुक्स यांच्या लेखात ते कौंडिण्य वगैरे वाचलं. हे कौण्डिण्य आद्य मेटॅलर्जिस्ट होते काय? भूमी काण्डून तिच्यातून धातू मिळविणारे : सोने व तांबे. असं काहीसं कुठे तरी ऐकण्यात आलेलं. अधिक माहिती वाचायला आवडेल. After all, ROOTS fascinate all of us... तो धागा प्रतिसाद देऊन पुनर्जिवीत करावा काय?)


साठवणीच्या रांजणाचा वापर खुर्चीसारखा करून त्यात मृतदेहाला मांडी घालून बसवून केली होती. >> लिंगायत समाजात आजही मृतदेहाला याच पद्धतीने नेतात. (त्यामुळे जिवंत असताना मांडी घालून झोपणे हे सोलापूर भागात तरी निषिद्ध आहे!)
दुष्काळ कसा व किती पडला होता याची उत्तरे क्लायमॅटॉलॉ़जी देऊ शकते का?

<<दुष्काळ कसा व किती पडला होता याची उत्तरे क्लायमॅटॉलॉ़जी देऊ शकते का?>>
हो, देऊ शकते पण मी इथेच वरती अस्चिग ला उत्तर दिलंय त्याप्रमाणे कालमापन नमुन्यांसारख्याच अडचणी या अभ्यासात पण येणार. शिवाय राजस्थान, दख्खन, उत्तर कर्नाटक अशा मोठ्या भूभागातून पुरेशी सॅम्पल्स घेऊन हे काम करायला लागणार. यात भूगर्भशास्त्रज्ञ, पुरातत्वज्ञ, पुरावनस्पति आणि अशाच इतर तज्ञांचा सहभाग लागणार. राजस्थानमधे तरीही हे काम बर्‍याच प्रमाणात झालं आहे. दख्खनमधे नाही. त्यामुळे राजस्थानच्या निष्कर्षांचा पाया घेऊन आम्ही पुढे जातो. शिवाय दुष्काळ पडला हे मान्य असलं तरी वेगवेगळ्या भूभागात वेगवेगळ्या लोकसमूहांनी त्याला भिन्नभिन्न स्वरूपात तोंड दिलं असायचीही शक्यता आहे.. हे सगळे धागेदोरे जुळवणं हे एका तज्ञसमूहाचे निदान काही दशके पुरे पडणारे काम आहे.... कुठल्याच प्रश्नाला चटकन उत्तरं त्याची त्याच पिढीत फार क्वचित मिळतात आमच्या शास्त्रात. एका रक्ताच्या थेंबापासून हजारो असुर निर्माण व्हावेत तसं एका कामातून हजार दीर्घ प्रकल्प सुरू व्हावेत असे प्रश्न उभे ठाकतात

http://www.whoi.edu/main/news-releases?tid=3622&cid=132589
http://www.hindustantimes.com/world-news/Americas/Monsoon-shift-may-have...
ही एकदम ताजी बातमी आहे!

हो, बातमी ताजी आहे पण निष्कर्ष नवे नाहीत Happy
कारातिनी वगैरे विदेशी पुरापर्यावरणशास्त्रज्ञांनीसुद्धा आपल्या पश्चिम किनारपट्टीचा अभ्यास करून मिळतेजुळते निष्कर्ष काढलेत आणि ते राजस्थानच्या निष्कर्षांशी बर्‍यापैकी जुळतात. प्रख्यात पुरातत्वज्ञ म. के. ढवळीकर (इनामगावचे उत्खनक) यांचं 'पर्यावरण आणि संस्कृती' नावाचं एक पुस्तक आहे. त्यांचं ठाम म्हणणं आहे की भारतीय संस्कृतीचे चढउतार हे पर्यावरणाशीच निगडित आहेत...
सिंधूसंस्कृतीचा नाश मात्र अशा कोणत्या एकाच कारणामुळे झाला नाही. अनेक पर्यावरणीय, आर्थिक, सामाजिक, राजकीय घटक त्यात असणार.. आणी खरंतर सिंधूसंस्कृतीचा नाश नाहीच झाला तर शहरीकरण लयाला गेलं, लिपीचं, शहरी बांधणीच्या तंत्रज्ञानाचं विस्मरण झालं आणि परत एकदा सर्व लोकसमूह ग्रामीण झाले. बहुतेक ठिकाणी हे ग्रामीण समाजच पुढे कालांतराने लोहयुगात गेले आणि संस्कृतीचा प्रवाह खंडित झाला नाही... यात अनेको आतल्या- बाहेरून आलेल्या समाजसमूहांची भर पडत गेली मात्र.
फारएण्डा, धन्यवाद 
अरे रांजण, मडकी करण्यासाठी चाकं होतीच/ असणारच. काही साठवणीचे रांजण हातघडणीचे आहेत. एरवी सगळी भांडी मस्तपैकी चाकावर केलेली आहेत. भांड्यांच्या आत हातात धरून चाकावर फिरवल्याने उठलेले स्ट्राएशन मार्क्स (striation marks) असतात. त्यावरून हे कळतं

एक प्रश्न - हे इनामगाव लोक सोडून गेल्याने अशा अवस्थेत राहिले हे कसे ठरवतात? म्हणजे पुराच्या पाण्यात किंवा प्रचंड प्रमाणावर माती/गाळ वाहून गावच त्यात गाडले गेले किंवा रोगाच्या साथीने तसे झाले हे सर्व ठरवण्याच्या काही ठराविक पद्धती आहेत का?
दुसरे म्हणजे हे जे पुरावे मिळतात - प्रामुख्याने खापरे व इतर वस्तू यावरून या लेखात आहे तशी काही अनुमाने काढायची म्हणजे त्यावेळच्या हवामाना बद्दल, सामाजिक स्थिती बद्दलही बरीच माहिती त्याबरोबर वापरावी लागत असेल. तो ही अभ्यास पुरातत्त्वखात्यातील लोकांनाच करावा लागतो, की असे विविध विषयातील तज्ञ एकत्र काम करतात अशा प्रोजेक्ट्स वर?
 
 
 
 
 
महाराष्ट्राची पार्श्वभूमी
प्राचीन महाराष्ट्र :
   महाराष्ट्र हे भारतातील एक पुरोगामी, प्रगत व समृद्ध,सांस्कृतिक वारसा लाभलेले राज्य आहे.मुंबई ही महाराष्ट्राची राजधानी आहे .सध्याचा गुजरात व महाराष्ट्र राज्याचे मिळून १ नोव्हेंबर १९५६  रोजी दुवैभाषिक मुंबई राज्य स्थापन झाले.त्यानंतर मध्य प्रांतातून विदर्भ व हैदराबाद राज्यातून मराठवाडा मुंबई राज्याला जोडून १ मे १९६० रोजी महाराष्ट्र राज्याची स्थापना झाली. महाराष्ट्राचे स्थान  १५.८ उत्तर ते २२.१ उत्तर अक्षांश व ७२.६६ पूर्व ते ८०.९ पूर्व रेखांशांच्यादरम्यान आहे.महाराष्ट्राचे क्षेत्रफळ ३,०७,७१३ चौ.कि.मी.असून क्षेत्रफळाच्या दृष्टीने राजस्थान व मध्य प्रदेशानंतर देशात तिसरा क्रमांक लागतो.   महाराष्ट्राची पूर्व-पश्चिम लांबी ८०० कि.मी  व उत्तर दक्षिण ७०० कि.मी असून महाराष्ट्रात सध्या एकूण ३६  जिल्हे व ३५८  तालुके आहे.महाराष्ट्राला एकूण ७२० किमी लांबीची किनारपट्टी लाभली आहे. प्रशासनाच्या सोयीसाठी महाराष्ट्राची पुढील सहा प्रशासकीय विभागात विभागणी केली आहे.कोकण, पुणे, नाशिक, औरंगाबाद , अमरावती व नागपूर .  २०११ च्या जनगणनेनुसार महाराष्ट्राची लोकसंख्या ११,२३,७२,९७२ इतकी आहे.
महाराष्ट्र शब्दाचा अर्थ व व्युत्पत्ती  :-
    महाराष्ट्र आणि मराठी भाषा यांचा उदय नेमका कधी झाला याबाबत विद्वानांमध्ये मतभिन्नता आढळते. देश, राष्ट्र या संज्ञा आजकाल राजकीय व सामाजिक दृष्टिकोनातून वापरल्या जातात. परंतु पूर्वीच्या काळी गणराज्ये होती. प्राचीन काळी ‘आर्यावर्त आणि ‘दक्षिणपथ' असे भारताचे दोन विभाग होते. उत्तरेत ‘आर्य व दक्षिणेत ‘द्रविड' लोक राहत असत. विंध्य पर्वताच्या दक्षिणेच्या प्रदेशाला ‘दक्षिणपथ' म्हटले जाई. यामध्ये कलिंग, आंध्र, सुराष्ट्र, आनर्त, अपरांत, कुंतल वं देवराष्ट्र इत्यादी भूभागांचा उल्लेख आढळतो. सर्वप्रथम कौटिल्याच्या ‘अर्थशास्त्र' या ग्रंथामध्ये अश्मक व अपरांत येथील पावसाच्या प्रमाणाचा उल्लेख आहे. इ. स. पू. तिस-या शतकात सम्राट अशोकाच्या काळात महारठ्ठ' प्रदेशात धर्मोपदेशकांना बौद्ध धर्माचा प्रचार करण्यासाठी पाठवल्याचा उल्लेख शिलालेखातुन प्राप्त होतो. इ. स. पू. दुस-या शतकातील सातवाहनांच्या नाणेघाटातील लेखात महारठ्ठ असा उल्लेख आढळतो. इ. स. ३६५ च्या मध्य प्रदेशातील ‘फेरण' स्तंभालेखात राजा श्रीधर वर्माचा सेनापती ‘सत्यनाग हा स्वत:ला महाराष्ट्री म्हणवतो. चालुक्य राजा दुसरा पुलकेशी याच्या ऐहोळ प्रशस्तीमध्ये रविकीर्ती याने महाराष्ट्राचा उल्लेख केल्याचे आढळते.
  डॉ. भांडारकरांनी असे मत मांडले आहे की, ‘रठ्ठ' या शब्दाचेच संस्कृत रूप राष्ट्रीक असून ‘भोज' स्वत:ला महाभोज म्हणत  असत. तसेच राष्ट्रीक' आपणास महाराष्ट्रीक म्हणत असत. महाराष्ट्र हे नाव कुठल्याही जातीवरून व वंशावरून पडले नसून ते प्रदेशाच्या विस्तारावरून पडले, असे मत पा. वा. काणे यांनी मांडले आहे.
   साधारणपणे इतिहासाची विभागणी प्रागैतिहास, इतिहासपूर्व व ऐतिहासिक कालखंड अशा तीन भागात केली जाते.
प्रागैतिहास - 
    ज्या काळात मानवास लिपी अवगत नव्हती व मानवी जीवन हे रानटी व भटक्या स्वरूपाचे होते. या कालखंडाला प्रागैतिहास असे म्हणतात. यानुसार अश्मयुगाचा समावेश प्रागैतिहास काळात केला जातो
 इतिहासपूर्व - ज्या काळातील मानवाचे जीवन प्रागैतिहासिक मानवापेक्षा प्रगत होते व या मानवाला लिपी अवगत होती; परंतु ती अस्पष्ट किंवा गूढ असल्याने तिचे वाचन करता आले नाही. या कालखंडाला इतिहास पूर्व काळ असे म्हणतात. सिंधू संस्कृतीची गणना इतिहास पूर्वकाळात केली जाते.
 ऐतिहासिक कालखंड - ज्या काळात मानवाचे जीवन सुसंस्कृत बनले व ज्या काळात लिखित ऐतिहासिक पुरावे प्राप्त होतात, त्या कालखंडाला ऐतिहासिक कालखंड असे म्हणतात. यानुसार इ. स. पू. ६ व्या शतकापासूनच्या कालखंडाला ऐतिहासिक कालखंड असे मानले जाते.

अश्मयुग (Stone Age) :
    मानवाच्या भौतिक विकासामध्ये अश्म म्हणजेच दगडाचे खूप महत्त्व आहे. प्रारंभी मानवाने दगडाचा उपयोग करून अन्न संग्रहित केले, दगडाचा उपयोग करून निवारा बनवला, दगडावरच कलेचे आविष्कार केले व अग्नीची ही उत्पत्ती दगडाद्वारेच केली. प्रारंभिक मानवाने आपली अवजारे, हत्यारे व निवारा यासाठी दगडांचा वापर केल्याने या कालखंडाला ‘अश्मयुग' असे म्हणतात.
भारतामध्ये इ. स. १८६३ मध्ये रॉबर्ट ब्रुस फुट या भूतत्त्व विद्वानाला मद्रास जवळील पल्लवरम येथे सर्वप्रथम पुराश्मयुगीन पाषाणोपकरण मिळाल्यावरच अश्मयुगीन काळातही भारतात लोकवस्ती असल्याचे निश्चित झाले.

अश्मयुगीन हत्यारे व साधने
अश्मयुगीन हत्यारे व साधने

महाराष्ट्रात विविध ठिकाणी उत्खननाद्वारे सापडलेल्या हत्यारांच्या आधारे अश्मयुगाची तीन कालखंडात विभागणी केली जाते.
१ पुराश्मयुग (इ. स. पू. ३ लाख ते इ. स. पू. ८०००)
२ मध्याश्मयुग (इ. स. पू. ८००० ते इ. स. पू. ४०००)
३ नवाश्मयुग (इ. स. पू. ४००० ते इ. स. पू. १०००)

 पुराश्मयुग (Palaeolithic Age) :
 पुराश्मयुगीन मानवाची वैशिष्ट्ये :-
१)पुराश्मयुगीन मानवी जीवन हे भटक्या स्वरूपाचे होते.२)या काळातील मानव उन, थंडी, पाऊस, हिंस्र राणी  इ.पासून संरक्षणासाठी नैसर्गिक गुहा व मोठ्या शिळांचा आश्रय घेत असे. ३) या काळातील मानव कच्चे मांस व कंदमुळे खात असे. ४) पुराश्मयुगीन मानव झाडांच्या साली व प्राण्यांच्या कातड्यांनी आपले शरीर झाकत असे. ५)या काळातील मानवाचे शारीरिक अवशेष उत्खननातून मिळाले नाहीत.६)पुराश्मयुगीन मानव शिकारीसाठी ओबडधोबड व आकाराने  मोठ्या  दगडांचा वापर करत असे. ७)या काळातील हत्यारे बेसाल्ट व डोलेराईट या खडकापासून बनवलेली असत. नंदूरबार जिल्ह्यातील कुंभारपाडा व उमरज, धुळे जिल्ह्यातील भाडणे, नाशिक जिल्ह्यातील गंगापूर व अहमदनगर जिल्ह्यातील नेवासे येथून पुराश्मयुगीन अवशेष प्राप्त होतात.८) उत्खननात सापडलेल्या हत्यारांमध्ये हातकु-हाडी,  तासण्या, वेधण्या  यांचा समावेश   होतो.
मध्याश्मयुग (Mesolithic Age) :
मध्याश्मयुगीन मानवाची वैशिष्ट्ये :-
१)पुराश्मयुगीन थंड हवामानात बदल होऊन मध्याश्मयुगात हवा  उबदार बनली. त्यामुळे या काळातील हत्तीसारखे मोठे प्राणी नाहीसे होऊन चपळ व आकाराने लहान प्राणी अस्तित्वात आल्याने या मानवाला शिकारीच्या तंत्रात बदल करावा लागला. त्यांनी सूक्ष्म आणि भूमितीजन्य आकाराची हत्यारे बनवली.यालाच 'सूक्ष्मास्त्रे' म्हणतात. सूक्ष्मास्त्रे (microliths) ही मध्याश्मयुगाची प्रमुखवैशिष्ट्ये आहेत.२)या काळातील हत्यारांमध्ये हातकु-हाडी, वेधण्या,  तासण्या, तीराग्रे, टोकदार हत्यारांचा  समावेश होतो. ३)मध्याश्मयुगाच्या शेवटच्या काळात शेतीचा शोध लागला. ४) मृदभांड बनवण्याची कला या मानवाने अवगत केली. ५)या काळातील मानव पशुपालन करू लागला. ६)मानवाला याच काळात अग्नीचा शोध लागला.
७) या काळातील हत्यारे ही ज़स्पर, चर्ट, एगट अशा दगडांची  बनवली जाऊ लागली. ८)शिकारीसाठी व संरक्षणाच्या सामूहिक भावनेतून हा मानव  टोळी करून राहू लागला. ९)गाय, बैल, म्हैस, घोडा, शेळी, मेंढी यांची या काळात शिकार केली जाई. १०)पुरलेल्या मृताजवळ सापडलेल्या दैनंदिन वापरातील भांडी व  हत्यारांवरून त्या काळातील मानवाचा मरणोत्तर जीवनावर विश्वास असल्याचे दिसून  येते.११)नेवासे, नांदेड, जळगाव व गोदावरी नदीच्या  खो-यात या काळातील हत्यारे सापडली  आहेत.    नवाश्मयुग (Neolithic Age) :
नवाश्मयुगीन मानवाची वैशिष्ट्ये :-
१)दगडी नांगराद्वारे शेती करण्याचे तंत्र या काळात मानवाने अवगत केले. २)शेतीसाठी उपयुक्त अवजारांची निर्मिती या मानवाने केली.३)या काळातील मानवाने अन्न संचयनासाठी मृदभांड्यांचा वापर मोठ्या प्रमाणात सुरू केला. ४)कुंभाराच्या चाकाचा शोध लागल्याने या काळातील मानवाचे जीवन गतिमान बनले. ५)या काळातील मानव हा अग्नीचा उपयोग करू लागला. ६)शेतीमुळे मनुष्य जीवनास स्थैर्य प्राप्त झाले व समूहाने गावात राहण्याची सुरुवात झाली. ७)उत्खननातून मोठ्या प्रमाणात भित्तिचित्रे मिळतात. ८)झाडांच्या साली व कातडी वस्त्राबरोबरच कापसाद्वारे आणि लोकरीद्वारे कापड विणण्याचे ज्ञान या काळातील मानवाला झाले. ९) या काळातील घरे, लाकडाची, दगडाची बनली होती.झोपडी बांधूनही लोक राहात होते. व खेड्यातहीघरे बांधल्याचे अवशेष येथे प्राप्त होतात. १०)या काळातील मानव हे मूर्तिपूजक होते.
 कार्बन १४ पद्धती :
पुरातत्त्वीय पुराव्यांचे कालमापन करण्यासाठी या पद्धतीचा वापर केला जातो. ही पद्धत एफ. डब्ल्यू. लिबी यांनी १९४९ साली शोधून काढली व १९६० साली परिपूर्ण केली. या कामाबद्दल त्यांना रसायनशास्त्राचे नोबेल पारितोषिक देण्यात आले.
 प्रत्येक सजीव (मानव, वनस्पती, प्राणी) जिवंत असेपर्यंत कार्बन-डायऑक्साईडद्वारे कार्बन १४ शरीरात घेत असतो. सर्व सजीवांमध्ये सी-१४ चे प्रमाण एकच असते व मृत्यूनंतर सर्व सजीवांच्या अवशेषातून सी-१४ एकाच प्रमाणात बाहेर पडते. जिवंतपणी असलेल्या सी-१४ चा अर्धा भाग मृत्यूनंतर ५५६८ वर्षांनंतर नाहीसा होतो. या कालावधीला सी-१४ चे अर्धे आयुष्य म्हणतात.
या पद्धतीनुसार आधुनिक काळातील कार्बनच्या किरणोत्सर्जनाशी मृत प्राण्याच्या किरणोत्सर्जनाची तुलना केली असता प्राण्याचा मृत्यू केव्हा झाला हे ठरवता येते.
सिंधू संस्कृती  (इ.स.पू. २५००- इ.स.पू. १७००) :
   सुमारे ५००० वर्षांपूर्वी जगातील प्रमुख चार नद्यांच्या काठी मानवी संस्कृती निर्माण झाल्या. यामध्ये तैग्रीस आणि युफ्रेटिस नद्यांच्या काठी मेसोपोटेमिया संस्कृती, नाईल नदीकाठी इजिप्तची संस्कृती, सिंधू नदीच्या काठी सिंधू संस्कृती आणि हो-हँग-हो नदीच्या काठी चिनी संस्कृतीचा उदय झाला. नद्यांच्या किनाच्याजवळील गाळाची व सुपीक मृदा, शेतीस योग्य वातावरण व पाण्याचा उपयोग करून मानवाने शेतीतून अन्नोत्पादने वाढवली. अन्नधान्यांचे अतिरिक्त उत्पन्न वाढल्याने काही मानवांनी शेती कार्यास पूरक व्यवसाय, घरांची निर्मिती, धातू उद्योग अशा प्रकारचे कार्य करण्यास सुरुवात केली. या वस्तूंच्या देवाण-घेवाणीसाठी ग्रामीण समुदायात राहणारा मनुष्य मोठ्या संख्येने एकत्र येऊन राहू लागला व यातूनच नागरी संस्कृतीची निर्मिती झाली.
सिंधू संस्कृतीचा शोध  : - सिंधू संस्कृतीचा पहिला उल्लेख चाल्र्स मेसन यांनी १८२६ मध्ये केला; परंतु सिंधू संस्कृतीची खरी ओळख १९२०-२१ साली लाहोर-मुलतान रेल्वेसाठी खोदकाम करताना सापडलेल्या विटा, मुद्रा व इतर पुरातत्त्वीय अवशेषांमुळेच झाली. जॉन मार्शल, राखालदास बॅनर्जी, दयाराम सहानी, माधव स्वरूप वत्स इ. पुरातत्त्व विद्वानांच्या परिश्रमपूर्वक उत्खननामुळे एका अतिप्राचीन संस्कृतीचा शोध लागला. दयाराम सहानी यांनी १९२१ मध्ये या संस्कृतीतील ‘हडप्पा' शहराचा उत्खननातून शोध लावला. हडप्पा' हे शहर सिंधू संस्कृतीमधील सर्वप्रथम उत्खननीत स्थळ असल्याने व सिंधू संस्कृतीच्या इतर उत्खननित शहरातील सर्वच लक्षणे या शहरात आढळत असल्याने सिंधू संस्कृतीलाच 'हडप्पा संस्कृती' असे ही म्हणतात.
   स्थान-विस्तार  : - पूर्वेस आलमगीरपूर, पश्चिमेस सुत्केगेंडोर, दक्षिणेस महाराष्ट्रातील दायमाबाद व उत्तरेस जम्मूमधील मांडा अशा याच्या सीमा आहेत. पूर्व पश्चिम १६०० किमी व दक्षिण उत्तर ११०० किमी याची लांबी, रुंदी असून एकूण १२,९९,६०० चौकिमी भारताचा भाग याने व्यापला आहे. पंजाब, राजस्थान, गुजरात, बलुचिस्तान, हरियाणा व महाराष्ट्र इत्यादी प्रदेशात या संस्कृतीचा विस्तार झाला आहे.
 सिंधू संस्कृतीची वैशिष्ट्ये  : - हडप्पा, मोहनजोदडो, रंगपूर, सुरकोटडा, कालीबंगन, रोपड, दायमाबाद, मेहरगढ, चहूदंडो, ढोलवीरा अशा ४०० हून अधिक ठिकाणच्या उत्खननित अवशेषांवरून सिंधू संस्कृतीची पुढील काही वैशिष्ट्ये दिसून येतात. 
१) सिंधू संस्कृती ही कास्ययुगीन संस्कृती आहे.
२) ही एक नागरी व व्यापार प्रधान संस्कृती आहे.
३) सिंधु संस्कृतीमध्ये सामाजिक व धार्मिक वैमनस्यांचा अभाव आहे. 
४) अन्य संस्कृतीशी सिंधू संस्कृतीचे व्यापारीक संबंध असल्याचे उत्खननीत पुराव्यांवरून समजते.
५) सिंधू संस्कृतीमधील लोकांना लिपीचे ज्ञान होते.
६) सिंधू संस्कृती ही एक शांतताप्रिय संस्कृती होती.
७) सिंधू संस्कृतीमध्ये मंदिरांचा अभाव दिसून येतो.
८) सिंधू संस्कृतीमधील वजनमापात समानता दिसून येते.
९) सिंधू संस्कृतीच्या सर्व नगरांना तटबंदी होती. .
१०) सिंधू संस्कृतीमध्ये नगर नियोजनास महत्त्व होते.
 सिंधू संस्कृतीच्या ऱ्हासाची कारणे  : - सिंधू संस्कृतीच्या  -हासांच्या कारणाबाबत इतिहासकारांनी विविध मते नोंदवली आहेत. काही इतिहासकारांच्या मते, हवामानातील बदल, सिंधू नदीच्या प्रवाहाच्या दिशेत बदल, सततचा दुष्काळ यामुळे लोकांनी स्थलांतर केले असावे. त्यामुळे या संस्कृतीचा -हास झाला असावा. तसेच काही इतिहास संशोधकांनी आर्यांच्या आक्रमणामुळे, व्यापारातील मंदीमुळे व भूकंपासारख्या नैसर्गिक आपत्तीमुळे ही संस्कृती नष्ट झाली असावी, असे मत नोंदवले आहे. सुमारे इ. स. पू. १७५० च्या दरम्यान सिंधू संस्कृतीचा -हास झाला असावा.
ताम्रपाषाण युग (Chalcolithic Age)
 सिंधू संस्कृतीच्या उत्तर काळात महाराष्ट्रातील काही भागात   तांब्याचा वापर करून कृषीप्रधान संस्कृती निर्माण झाल्या. या काळातील अवजारे व हत्यारे ही ताम्र (तांबे) व पाषाणांच्या संयुक्त वापराने बनवलेली असल्याने या कालखंडाला ‘ताम्रपाषाण युग' असे म्हणतात.
महाराष्ट्रातील ताम्रपाषाण स्थळे व कालखंड : - प्रकाशे, नेवासे, चांदोली, सोनगाव, टेक्वाडे, सावळदे, दायमाबाद, बहाळ अशा महाराष्ट्रातील अनेक ठिकाणी ताम्रपाषाण संस्कृतीचे अवशेष प्राप्त झाले आहेत व याचा कालखंड सुमारे इ. स. पू. २२०० ते इ. स. पू. १००० असा मानण्यात येतो.
पुरातत्त्व विद्वानांनी उत्खननीत ताम्रपाषाण युगीन स्थळांचे सावळदा संस्कृती, उत्तर सिंधू, दायमाबाद, माळवा व जोर्वे संस्कृती असे विभाजन केले आहे.
ताम्रपाषाण युगाची वैशिष्ठ्ये  : -
१) गृहरचना - ताम्रपाषाण संस्कृतीच्या लोकांची गृहरचना उत्कृष्ट व  योजनाबद्ध होती. ही      घरे आयताकृती तसेच गोलाकार असत.यातील आयताकृती घरे कुडाच्या भिंतींची असते. तर गोलाकार घरे झोपड्यांसारखी असत.घरासाठी भाजलेल्या विटांचा वापर केला जाई.
२) उत्खननीत भांड्यामध्ये गोलाकार भांडी, वाडगे, लोटा, उथळ तळाची भांडी मिळतात. त्यावर हरिण, मोर, चित्ता, बैल, पक्षी इत्यादींची चित्रे काढलेली आढळतात.
३) हत्यारे - ताम्रपाषाण युगीन लोकांनी दगड व हाडांच्या बरोबरच हत्यारे व अलंकार बनवण्यासाठी तांब्याच्या धातूचा वापर करण्याचे तंत्र विकसित केले. चालकोपायराईटचा उपयोग तांब्याच्या धातूला वितळवण्यासाठी करत असत. तांब्यापासून कुन्हाडीचे पाते, टोकदार हत्यारे, चाकू, बाण, भाल्याचे टोक बनवत असत.
४) कृषी जीवन - ताम्र व पाषाण यांच्या संयुक्तिक वापराने शेतीसाठी उपयुक्त अवजारांची निर्मिती केल्याचे दिसते. ताम्रपाषाण संस्कृतीतील हे लोक शेती करू लागल्याने त्यांच्या स्थायी स्वरूपाच्या वास्तव्यातून खेडी निर्माण झाली व यातूनच ग्रामीण महाराष्ट्राचा प्रारंभ झाला. या काळात गहू, तांदूळ, मसूर, मूग, उडीद, बाजरी इ. धान्ये पिकवली जात. तर गाय, बैल, म्हैस इ. प्राणी पाळले जात. उत्खननातून सापडलेल्या मासे पकडण्याच्या गळावरून मासेमारीचा व्यवसाय या काळात मोठ्या प्रमाणात असल्याचे दिसते.
५) समाजजीवन व धार्मिक संकल्पना - या काळातील मानव हा शाकाहार व मांसाहारांचा अन्नामध्ये समावेश करत. कंदमुळे व फळे याबरोबरच दुधाचाही आहारात समावेश करत. मनोरंजनासाठी सामूदायिक शिकार, प्राण्यांच्या झुंजी हे खेळ प्रचलित होते. उत्खननातून प्राप्त मातृदेवीच्या मूर्तीवरून हे मातृपूजा व प्राणी पूजा करत असावेत.
६) अलंकार - ताम्रपाषाण युगीन मानव शंख-शिंपल्यांच्या बांगड्या, तांबे धातूपासून बनवलेली आभूषणे, दगडी मणी व हस्तिदंताचीही सौंदर्य प्रसाधनांसाठी वापर करत असत. बांगड्या, अंगठ्या, कर्णफूले इ. अलंकारांचा हे लोक वापर करत असत.
७) दफन पद्धती- ताम्रपाषाण युगीन लोकांचा मरणोत्तर जीवनावर विश्वास असल्याचे उत्खननात, मृत अवशेषांच्या पुराव्यांवरून दिसून येते. मृतदेह पुरण्यासाठी दफनकुंभ व शवपेटीचा वापर करत. मृताच्या दैनंदिन वापरातील वस्तू मृतासोबतच पुरल्याचे दिसून येते.
महापाषाणयुगीन संस्कृती (Megalithic Age) :
'Megas' म्हणजे मोठा व 'litho' म्हणजे दगड या दोन शब्दांपासून Megalith म्हणजेच मोठा दगड हा शब्द बनला आहे. मृत्यूनंतर मृताच्या दैनंदिन व आवडीच्या वस्तू त्यासोबतच पुरल्या जात व याजागी त्याची स्मृती म्हणून एक मोठा दगड किंवा दगडाचा ढीग विशिष्ट पद्धतीने ठेवला जाई. दफनासाठी वापरलेल्या या  पाषाणाच्या विशिष्ट पद्धतीमुळे या कालखंडाला ‘महापाषाण युग असे म्हणतात. महाराष्ट्रातील महापाषाण युगाचा काळ हा इ. स. पू. १००० वर्षांपूर्वीचा आहे. ही एक लोहयुगीन संस्कृती आहे. महाराष्ट्रात धुळे जिल्ह्यातील रंजाळा, जळगाव जिल्ह्यातील बहाळ, टेकवाड़े तसेच नागपूर जिल्ह्यातील माहरझरी इ. ठिकाणी याचे अवशेष प्राप्त होतात.
महाराष्ट्रातून प्राप्त महापाषाण उत्खननाद्वारे या काळाची पुढील वैशिष्ट्ये दिसून येतात.
१) या काळातील मृत अवशेष शिलावर्तुळात, खड्ड्यात व शवपेटीत ठेवल्याचे अनेक सांगाडे उत्खननातून प्राप्त होतात.
 २) मृताबरोबर लोखंडी भाले, तलवारी, कट्यारे, कु-हाडी अशा हत्यारांचे  अवशेष प्राप्त झाले आहेत.
३) गहू, ज्वारी, बाजरी, उडीद, तांदूळ यांचे उत्पादन या काळात घेतले जाई.
 ४) कुत्रा, बैल, घोडा, गाय, हरिण, रानडुक्कर, बकरा इ. प्राण्यांचा मांसाहारासाठी वापर केला जाई.
 ५) या काळातील मानव मातीच्या घरात, कच्च्या विटा व कुडांनी  बांधलेल्या घरात राहात असत.
 ६) या काळातील मानव सोने, चांदी, ब्राँझ धातूपासून बनवलेले अलंकार वापरत असत.
 ७) विदर्भातील नैकुंड येथे लोह शुद्ध करण्याची भट्टी सापडली आहे.यावरून धातू व्यवसाय हा या काळात मोठ्या प्रमाणात  चालत असल्याचे संकेत प्राप्त होतात.  
 ८) या काळातील मानवांनी शेतीबरोबरच पशूपालनासही महत्त्वदिले होते.कुंभाराच्या चाकावर मृदभांडी बनवणे, त्यावर चित्रकला, नक्षीकाम व  भाजून पक्के बनवणे यामध्ये ते कुशल असल्याचेपुरावे मिळतात.
९) काच, दगडी मणी, नीलमणी यांचाही वापर अलंकार म्हणून करत    असत.
सातवाहन कालखंड (इ.स.पू. २३०ते इ.स. २३०) :
प्रस्तावना
  मौर्य साम्राज्याच्या ऱ्हासानंतर उत्तर भारतात गुंग आणि कण्वांचे वर्चस्व निर्माण झाले. याचवेळी महाराष्ट्रात सातवाहन घराण्याचा उगम झाला. सातवाहनांनी राजकीय स्थैर्य, उत्कृष्ट प्रशासन, धार्मिक सहिष्णुता व व्यापारास चालना दिल्याने सुस्थिर शासन निर्माण केले. त्यामूळे कला, स्थापत्य व साहित्यामध्येही भरभराट झाली.
  सातवाहनाच्या ३० राजांनी इ. स. पू. २३० ते इ. स. २३० असे एकूण ४६० वर्षे महाराष्ट्रावर राज्य केले. जागतिक नकाशावर महाराष्ट्रास सर्वप्रथम दर्शवणारे व महत्त्व प्राप्त करून देणारे सातवाहन हेच पहिले महाराष्ट्रातील राजघराणे होय. .
 सातवाहनांचे मूळ स्थान व कालखंड : - सातवाहनांच्या मूळ स्थानाविषयी विद्वानांमध्ये एकमत नाही. काही इतिहासकारांच्या मते ते मूळचे आंध्रप्रदेशचे आहेत. तर डॉ. मिराशीच्या मताप्रमाणे सातवाहनांचा मूळ प्रदेश विदर्भ होय. उपलब्ध ऐतिहासिक साधनांवरून सातवाहनांचे मूळ स्थान महाराष्ट्र असून पैठण (प्रतिष्ठान) ही त्यांची राजधानी होय.
 सातवाहनांच्या इतिहासाची साधने  : -  सातवाहन कालखंडाचा इतिहास जाणून घेण्यासाठी कोल्हापूर, पैठण, क-हाड, नाशिक, भोकरदन येथील पुरातत्वीय उत्खननांचा उपयोग होतो. तसेच उत्खननातून सापडलेल्या नाण्यांद्वारेही यांचा इतिहास समजण्यास मदत होते. याचप्रमाणे कालें, भाजे, बेडसे, पितळखोरे, अजंठा, कान्हेरी येथील लेणी, चैत्य, स्तुप, विहार व शिलालेख इ. च्या अवशेषांद्वारेही सातवाहनांच्या इतिहासावर प्रकाश पडतो. गुणाढ्याची ‘बृहत्कथा', राजा हाल याचा गाथा सप्तशती' इ. साहित्यातून व परकीय प्रवाशांच्या प्रवासवर्णनावरून सातवाहनांची माहिती मिळते.
सातवाहन राजवंशातील प्रमुख राजे  :
१) सिमुक  : - सिमुक हा सातवाहन राजवंशाचा संस्थापक होय. राजा सिमुकने शेवटचा कण्व राजा सुशर्मा याला ठार केले आणि आपली सत्ता प्रस्थापित केली. याने ‘विदर्भ आणि ‘विदिशा जिंकून घेतले व स्वत:ला ‘दक्षिणपथपती' असे बिरुद धारण केले.
२) सातकर्णी प्रथम : - राजा सिमुक नंतर त्याचा लहान भाऊ ‘कृष्ण' गादीवर आला. त्याने नाशिक जिंकून घेतले व १८ वर्षे राज्य केले. राजा कृष्णच्या नंतर सिमुकचा मुलगा सातकर्णी याला राज्य मिळाले. सातकर्णी प्रथम व त्याची राणी नागनिका यांची प्रतिमा जुन्नरच्या (नाणेघाट) प्रतिमा मालिकेत कोरल्याचे पुरावे मिळतात. हा पराक्रमी व मुत्सद्दी राजा होता. याने कलिंग नरेश खारवेलचा पराभव केला. हा वैदिक धर्माचा कट्टर पुरस्कर्ता होता. त्याने आपल्या हयातीत दोन अश्वमेध यज्ञ व एक राजसूय यज्ञ केल्याचे पुरावे आहेत. प्रथम सातकर्णीच्या शौर्यामुळे या राजवंशातील सर्व राजे आपल्या नावासमोर सातवाहन असा शब्दप्रयोग न करता सातकर्णी असाच करू लागले. यानंतर सुमारे एक शतक सातवाहनांच्या वाढत्या सत्तेला व सामथ्र्याला पायबंद बसला. सातकर्णीनंतर शकांच्या आक्रमणापुढे सातवाहनांचे राज्य दुर्बल बनले.
३)  राजा हाल :- या सातवाहन राजाबद्दल फक्त वाङ्मयीन साधनांच्या आधारे माहिती मिळते. याने प्राकृत भाषेला राजाश्रय देऊन गाथा सप्तशती' हा प्राकृत काव्य संग्रह रचल्याची माहिती मिळते.
४) गौतमीपुत्र सातकर्णी  : - गौतमीपुत्र सातकर्णीन सातवाहन सत्तेचे पुनरुज्जीवन केले. माळव्यापासून दक्षिणेकडील नाशिक प्रशस्तीमध्ये आपल्या मुलाचे वर्णन करताना ‘त्रिसमुद्रतोयपितवाहन' म्हणजेच ज्याचे घोडे तिन्ही समुद्राचे पाणी प्यायले आहेत असे गौरवपर उद्गार गौतमी बलश्री हिने काढले आहेत. कानडी मुलखापर्यंत त्याचे साम्राज्य पसरले होते. याने शक पल्लव, यवन यांचा पराभव केला व क्षत्रप राजा नहपानच पराभव करून सातवाहनांची प्रतिष्ठा वाढवली व दरारा निर्माण केला. आईबद्दल असलेल्या आदरामुळे त्याने स्वत:च्या नावापूर्वी आईचा आवर्जून उल्लेख केलेला दिसतो.
५) यज्ञश्री सातकर्णी: - हा सातवाहन घराण्यातील शेवटचा मोठा राजा होय. शकांनी यापूर्वी जिंकून घेतलेला प्रदेश त्याने परत जिंकून घेऊन आपले साम्राज्य वाढवले. जहाजाचे चित्र  असलेल्या त्याच्या काही नाण्यांवरून त्यांचे आरमार व व्यापाराविषयी माहिती मिळते.
शकांची आक्रमणे, सततची युद्धे, विशाल साम्राज्य, दुर्बल वारसदार या कारणांमुळे सातवाहन सत्तेचा -हास झाला.
सातवाहनकालीन आर्थिक परिस्थिती :
१) शेती :-  सातवाहनांचा काळ हा महाराष्ट्राच्या इतिहासात आर्थिक समृद्धीचा होता. या काळात शेती हा लोकांचा प्रमुख व्यवसाय होता. उत्पादनाचा १/१० भाग भूमीकर म्हणून शेतकरी राजाला देत. शेतीस पाणी पुरवठा करण्यासाठी तलाव, कालवे व विहिरी खोदल्या जात. “बृहतसंहिता'मध्ये खरीप व रब्बी पिकांचा उल्लेख केला आहे. शेती बरोबरच दूध व मांस यासाठी पशुपालन हा व्यवसाय केला जाई. गाय, बैल, घोडा, गाढव, खेचर, बकरी, मेंढी, कुत्रा, हत्ती, उंट हे प्राणी पाळले जात असत.
२) उदयोगधंदे - वस्त्रोद्योग हा या काळातील महत्त्वाचा उद्योग होय. साधे, तलम, मलमली रेशमी असे वस्त्रांचे उत्पादन या काळात घेतले जाई.
सोने, चांदी, पितळ, लोखंड, तांबे या धातूंचा दागिने, मूर्ती, कृषी अवजारे, घरगुती वस्तू बनवण्यासाठी वापर केला जाई. सातवाहन राजांच्या प्रोत्साहनामुळे परकीय व्यापार मोठ्या प्रमाणावर चालत होता व यामुळे भडोच, सोपारा ही बंदरे व पैठण, तेर सारखी शहरे प्रसिद्धीस आली.
सातवाहनकालीन धार्मिक परिस्थिती :
   सातवाहन राजे हे वैदिक धर्माचे अनुयायी व पुरस्कर्ते होते. यांनी अश्वमेध व राजसूय यज्ञ करून यज्ञपरंपरेचे पुनरूज्जीवन केले. यज्ञप्रसंगी भरपूर दानधर्म केला जाई. सूर्यपूजा, यक्षपूजा, मातृदेवता, नागदेवता इत्यादींना या काळात महत्त्व प्राप्त झाले.  
   शैव व वैष्णव धर्माबरोबरच बौद्ध धर्माचाही विकास झाल्याचे दिसून येते. बौद्ध भिक्षूसाठी अनेक विहार व स्तूप बांधून त्यांच्या उदरनिर्वाहाचीही व्यवस्था केली जाई.
सातवाहनकालीन सामाजिक परिस्थिती :
   सातवाहन काळात वर्णाश्रम व्यवस्था प्रचलित होती. ब्राम्हण, क्षत्रिय, वैश्य व शूद्र या चार वर्णाचा त्यात समावेश होता. त्यांची कर्तव्ये व अधिकार ठरलेले असत. वर्णव्यवस्थेचे रूपांतर जाति व्यवस्थेत झाले. जातीचे पोटजाती व उपजातींमध्ये भेद निर्माण झाले. सोळा संस्कारांना महत्त्वाचे स्थान प्राप्त झाले होते.
 सातवाहन काळात एकत्रित कुटुंब पद्धती प्रचलित होती. लोक शाकाहारी व मांसाहारी अन्न आहारात घेत असत. या काळातील शिल्पकला, चित्रकला व उत्खननीत वस्तूंवरून त्यांची सौंदर्यदृष्टी स्पष्ट होते. यामध्ये बांगड्या, ताईत, मणी, कर्णभूषणे, पैंजण, अंगठ्या यांचा समावेश होतो. शिकार, दुवंदव, रथशर्यती, कोंबड्यांची झुंज, सोंगट्या, फुगडी, गायन, वाद्य, नृत्य, सारिपाट ही मनोरंजनाची साधने होती.
सातवाहनकालीन प्रशासन व्यवस्था :
  २००० वर्षांपूर्वी वाहतुकीच्या सोयी नसताना सातवाहन राजांनी ४६० वर्षे उत्कृष्ट प्रशासनामुळे महाराष्ट्रावर राज्य केले. रज्जक, अमात्य, सचिव अशा मंत्र्यांची नेमणूक राजांच्या मदतीसाठी केली जाई. सातवाहनकालीन प्रशासनातील शेवटचा घटक ‘ग्राम' होय. गावच्या प्रमुखास ग्रामणी, ग्रामपती, ग्रामकुट म्हटले जाई.
सातवाहनकालीन कला व स्थापत्य :
   परकीय बाजारपेठांत भारतीय वस्तूंना महत्त्व असल्यामुळे पैठण, तेर, भोकरदन, कोल्हापूर अशा कला केंद्रांचा उदय झाला. येथे कलाकुसरीच्या वस्तू, हस्त कारागिरीच्या वस्तू बनवल्या जात. सातवाहन कालीन कलेमध्ये प्रामुख्याने वास्तू, शिल्प, स्थापत्य आणि चित्रकलेचा समावेश होतो.
स्तुपाची निर्मिती ही गौतम बुद्ध व बोधिसत्त्व प्राप्त केलेल्या साधु पुरुषांच्या अवशेषांचे व स्मृतीचे जतन करण्यासाठी केली जाई. स्तूप हे आकाराने अर्धगोलाकार असून या काळातील स्तूप अजंठा, कार्ले, भाजे, नाशिक येथील लेण्यांत आढळून येतात. बौद्ध भिख्खूच्या प्रार्थना स्थळाला चैत्यगृह म्हणतात. बौद्ध भिख्खूच्या निवासासाठी विहारांची निर्मिती करण्यात आली. सातवाहन कालोन भित्तिचित्राचे नमुने अजंठा, वेरूळ, कार्ले , भाजे, जुन्नर, पितळखोरा इ. ठिकाणच्या लेण्यातून पाहावयास मिळतात. अशा प्रकारे सातवाहन काळामध्ये महाराष्ट्राचा सर्वांगीण विकास झाल्याचे दिसून येते.

अजंठा स्थापत्य कला लेणे
वाकाटक घराणे :
  सातवाहन साम्राज्याच्या अस्तानंतर वाकाटकांच्या सत्तेचा महाराष्ट्रात उदय झाला. वाकाटक काळात महाराष्ट्राची सामाजिक,  आर्थिक व सांस्कृतिक प्रगती झाली. ( कालखंड साधारण - २९५ -५२५ )
राजकीय परिस्थिती  : - अजंठा लेण्यांमध्ये वाकाटकांना ‘वाकाटक वंशकेतु' असे म्हटले आहे. वायुपुराण व बिदर ताम्रपटातून ‘विंध्यशक्ती' याला वाकाटक घराण्याचा संस्थापक असे म्हटले आहे. विंध्यशक्तीच्या मृत्यूनंतर त्याचा पुत्र प्रथम प्रवरसेन याने इ. स. २७० ते इ. स. ३३० पर्यंत ६० वर्षे राज्य केले. हा या घराण्यातील सर्वांत बलशाली राजा होय. याने कोल्हापूर, सातारा, सोलापूर, दक्षिण कोसल, कलिंग व आंध्र हा भाग आपल्या वर्चस्वाखाली आणला. हा वैदिक धर्मानुचारी असून याने चार अश्वमेध यज्ञ केले.
  प्रवरसेनच्या मृत्यूनंतर त्याच्या साम्राज्याची विभागणी गौतमीपुत्र व सर्वसेन या पुत्रामध्ये झाली.
१) ज्येष्ठ शाखा : - प्रवरसेन पुत्र गौतमीपुत्र यांचा मुलगा पहिला रुद्रसेन जो समुद्रगुप्ताचा समकालीन होता. समुद्रगुप्ताशी याने सलोख्याचे संबंध ठेवले. यानंतर याचा पुत्र पृथ्वीसेन हा राजा बनला. त्याने आपला मुलगा दुसरा रुद्रसेनचा विवाह दुसरा चंद्रगुप्तची कन्या प्रभावती गुप्तशी केला व राजधानी नागपूरजवळ नंदिवर्धन येथे आणली. इ. स. ४९०च्या सुमारास वाकाटकांची ज्येष्ठ शाखा ही वत्सगुल्म शाखेत विलीन झाली.
२)वत्सगुल्म शाखा : - पहिल्या प्रवरसेनचा द्वितीय पुत्र सर्वसेन याने राजधानी वत्सगुल्म (सध्याचे वाशिम) येथे स्थापन केली.
   सर्वसेन हा उत्तम कवी होता. त्याने ‘धर्ममहाराज' ही उपाधी घेतली व 'हरिविजय' या प्राकृत काव्याची रचना केली. यानंतर दुसरा विंध्यशक्ती, दुसरा प्रवरसेन, देवसेन व हरिसेन असे राजे होऊन गेले. इ. स. ५५० च्या सुमारास महिष्पतीच्या कलचुरींनी वाकाटकांच्या विदर्भात आपले राज्य स्थापन केल्याने या सत्तेचा -हास झाला.
  वाकाटकाचे योगदान : - वाकाटक राजे हे साहित्य, विदया व कलेचे भोक्ते व आश्रयदाते होते. हिंदू धर्म आणि संस्कृती यांचे रक्षण करण्याची जबाबदारी यांनी पार पाडली. धार्मिक दृष्ट्या सहिष्णू असल्याने या काळात सर्वच धर्माचा विकास झाला. वंशपरंपरागत राजकीय सत्ता असूनही यांनी सत्तेचा अनियंत्रित वापर केला नाही. योग्य लष्कर व प्रशासनाद्वारे यांनी आपला साम्राज्य विस्तार व सुस्थिरता टिकवण्याचे काम केले. जमीन महसूल, आयात-निर्यात कर, मांडलिक राजांकडून येणारी खंडणी व राजकीय स्थिरतेमुळे या काळात आर्थिक प्रगती झाल्याचे दिसून येते.
  कवी कालिदासाचे अनेक वर्षे वाकाटकाकडे वास्तव्य असल्याने त्यांनी 'मेघदुत'ची रचना येथे केली. वाकाटक राजांनी कवी व विद्वानांना राजाश्रय दिला. थोडक्यात वाकाटकचा काळ हा महाराष्ट्रातील सामाजिक, राजकीय, आर्थिक, धार्मिक आणि सांस्कृतिक वैभवाचा काळ म्हणून ओळखला जातो.    
  बदामीचे चालुक्य घराणे :
वाकाटकानंतर महाराष्ट्रामध्ये चालुक्य घराण्याची सत्ता प्रस्थापित झाली.
( कालखंड पुर्वकाळ- ५३५ -७५३ व उत्तरकाळ ९७५-११८९ )
राजकीय परिस्थिती  : - बदामीच्या चालुक्य घराण्यातील पहिला राजा जयसिंह होय. पहिला पुलकेशी हा या घराण्यातील बलशाली राजा होय. याने अश्वमेध यज्ञ केला. साम्राज्याची व वातापी (बदामी) या राजधानीची पायाभरणी यानेच केली. कीर्तीवर्मन हा एक पराक्रमी राजा बदामीच्या चालुक्य घराण्यात होऊन गेला. याने आपल्या ११ वर्षांच्या काळात कदंब व नल राजांचा पराभव केला. अनेक राजांना आपले मांडलिक बनवले. कीर्तीवर्मनचा लहान भाऊ मंगलेश हा गादीवर आला. याने कल्चुरी व रेवती राजांचा पराभव केला. यांच्या कारकिर्दीच्या शेवटच्या काळात झालेल्या यादवी युद्धात त्याचा पुतण्या दुसरा पुलकेशी विजयी होऊन गादीवर आला.
   दूसरा पुलकेशी हा या घराण्यातील सर्वांत पराक्रमी व बलशाली राजा होय. वारसाहक्काकरिता राजकीय अस्थिरता निर्माण झाली होती. परंतु दुस-या पुलकेशीने सामंत व मांडलिक राजांवर पकड निर्माण केली. सैन्यव्यवस्था बळकट बनवली. याने मौर्य, कलचुरी, नल, राष्ट्रकूट, कदंब, गंग, आलुप वगैरे राजांचा पराभव करून महाराष्ट्र, कोकण, माळवा, विदर्भ इ. प्रांत जिंकून घेतले.
   याचवेळी उत्तर भारतातील प्रभावशाली व सामर्थ्यवान राजा हर्षवर्धन याचे आक्रमण झाले; परंतु या झालेल्या युद्धात हर्षवर्धनचा पराभव करून चालुक्य राजा दुसरा पुलकेशीने आपले श्रेष्ठत्व सिद्ध  केले. ऐहोळ येथील शिलालेखात रवि कीर्ती याने दुस-या पुलकेशीवर मिळवलेल्या विजयाची माहिती मिळते. यानंतर त्याने कलिंग व कोसल हे देश ही जिंकले.
  पल्लव राजा नरेंद्रसिंह वर्मा याने पुलकेशीचा पराभव केला व या युद्धात दवितीय पुलकेशी मारला गेला. यानंतर पहिला विक्रमादित्य विनयादित्य, विजयादित्य दसरा व कीर्तीवर्मन हे राजे झाले. दसरा किर्तीवर्मन हा या घराण्यातील शेवटचा राजा होय. राष्ट्रकूट राजा कृष्ण प्रथम याने याचा पराभव करून ही सत्ता संपुष्टात आणली.
  कल्याणीचे चालुक्य : - राष्ट्रकुटांनी बदामीच्या चालुक्याचा पराभव करून महाराष्ट्रात स्वत:चा एकछत्री अंमल सुरू केला. राष्ट्रकूट राजा दुसरा कर्क याच्या काळात चालुक्य मांडलिक सरदाराने (दुसरा तैलप) आपले स्वतंत्र राज्य जाहीर केले. याने चोल, चेदी, कुंतल, ओरिसा येथील राजांचा पराभव केला. या घराण्यातील सत्याश्रय, पहिला विक्रमादित्य, जयसिंह प्रथम, पहिला सोमेश्वर असे काही राजे होऊन गेले. चौथ्या सोमेश्वरच्या काळात यादवांनी यांचा पराभव करून चालुक्य सत्तेचा शेवट केला.
चालुक्यांचे योगदान : - चालुक्यांच्या दोन्ही शाखांमधील राजे हे कला, साहित्य व विद्येचे उपासक होते. अनेक विद्वान त्यांच्या दरबारात होते. चालुक्य राजांच्या काळात दक्षिणेत संस्कृत व कन्नड भाषेत मुबलक साहित्य निर्माण झाले. कवी बिल्हण चे ‘विक्रमांकदेवचरित', विज्ञानेश्वराचे, ‘मिताक्षरा', पंपाचे ‘पंपरामायण', सोमेश्वर तिसरा याचे ‘मानसोल्लास' अशा अनेक ग्रंथांची निर्मिती झाली. या काळातील वास्तुशिल्पे आजही त्यांच्या वैभवाची साक्ष देतात. बदामी, हंपी, ऐहोळ, पट्टदकल्ल, श्रवणबेळगोळ येथील मंदिरे यांच्या स्थापत्याची प्रगती दर्शवतात. ही सर्व मंदिरे द्रविड शैलीची आहेत.
चालुक्य हे वैष्णव पंथी असले तरी धर्मसहिष्णुतेचे धोरण त्यांनी अवलंबलेले दिसून येते. चालुक्यांनी सामाजिक, धार्मिक, आर्थिक व कला स्थापत्याच्या दृष्टीने केलेले कार्य उल्लेखनीय आहे.
राष्ट्रकूट घराणे :
   चालुक्य घराण्याच्या ऱ्हासानंतर इ. स. ७५३ च्या सुमारास राष्ट्रकूट राजे महाराष्ट्रावर सत्तारुढ झाले. प्रारंभी हे चालुक्यांचे सामंत होते. राष्ट्रकुटांची नंदिवर्धन (अचलपूर), सातारा जिल्ह्यातील माण, व मराठवाड्यातील लातूर येथे सत्ताकेंद्रे निर्माण झाली. यापैकी लातूर येथील सत्तेने ऐतिहासिक नावलौकिकता मिळवली. त्याचा संक्षिप्त इतिहास पुढीलप्रमाणे आहे.
 राजकीय इतिहास : - दंतीदुर्ग हा या घराण्याचा संस्थापक राजा होय. प्रारंभी हा गुजरातमधील चालुक्यांचा सामंत अधिकारी होता. चालुक्यांच्या दुर्बळ उत्तराधिकारी राजांचा फायदा घेत याने आपल्या स्वतंत्र राज्याची स्थापना केली. उत्तरेस नर्मदेपासून ते दक्षिणेस तुंगभद्रेपर्यंतचा प्रदेश जिंकून आपला साम्राज्य विस्तार केला. दंतीदुर्गनंतर  त्याचा चुलता कृष्ण प्रथम हा गादीवर आला. त्याने १८ वर्षे राज्य केले व चालुक्यांची उरलेली सत्ता समूळ नष्ट केली. कृष्ण प्रथम या राजाने जगप्रसिद्ध असलेले वेरूळ येथील कैलास मंदिर बांधले. यावरूनच त्याची वैभवता व संपन्नता दिसून येते.
  राजा कृष्णनंतर त्याचा ज्येष्ठ पुत्र गोविंद दुसरा व त्यानंतर राजा ध्रुव (ध्रुवधारावर्ष) हे गादीवर आले. याने आपल्या १३ वर्षांच्या काळात राष्ट्रकुटांचा उत्तर भारतात प्रभाव वाढवला. यानंतर राजा बनलेल्या गोविंद तिसरा याने कन्नोजचा सम्राट नागभट्ट व त्याच्या  मित्र संघावर हल्ला करून त्यांचा पराभव केला. याने उत्तर भारतातील अनेक राजांना मांडलिक बनवून त्यांच्याकडून खंडण्या वसूल केल्या. अमोघवर्ष हा एक साहित्यिक व शांतताप्रिय राष्ट्रकूट राजा होऊन गेला. याने ‘रत्नमालिका' व 'कविराजमार्ग' या ग्रंथांची रचना केली. राजा कर्क हा राष्ट्रकुटांचा शेवटचा राजा होय. कल्याणीचे चालुक्य व परमारांनी केलेल्या आक्रमणामुळे राष्ट्रकुटांच्या सत्तेचा -हास झाला.
 आर्थिक जीवन : - शेती हा या काळातील प्रमुख व्यवसाय होता. भूमी ही राजाच्या मालकीची असे. शेतसारा/महसूल हे राजाच्या उत्पन्नाचे प्रमुख साधन असल्याने त्याची मोजणी, पाणीपुरवठा, पतपुरवठा यासाठी राजाकडून मदतीची उदाहरणे मिळतात. कापूस, गूळ, कापड, मातीची भांडी, धातूच्या वस्तू अशा अनेक गोष्टींचा व्यापार केला जाई. या काळात अंतर्गत व परकीय व्यापारात भरभराट झाल्याचे दिसून येते.
धार्मिक परिस्थिती : - राष्ट्रकूट राजे हे जैन धर्माचे अनुयायी होते. तरीही त्यांनी हिंदू मंदिरे बांधून शैव व वैष्णव धर्मालाही राजाश्रय दिलेला होता. बौद्ध विहार बांधल्याचेही दाखले मिळतात. थोडक्यात, राष्ट्रकूट राजे हे धार्मिक दृष्ट्या सहिष्णुता बाळगणारे होते.
सामाजिक परिस्थिती : - चातुर्वर्ण्य व जातिव्यवस्था या काळातही होती. या काळात जातिव्यवस्था तीव्र असल्याचे दिसून येते. एकत्रित कुटुंब पद्धती या काळात अस्तित्वात होती. ब्राम्हण, क्षत्रिय, वैश्य व शूद्र अशा चार जाती व तिच्या पोटजातींमध्ये हा समाज विभागला गेला होता. आंतरजातीय व एक गोत्र विवाह होत नसे. या काळातील लोक गहू, ज्वारी, बाजरी, नाचणी, तांदूळ, मूग इत्यादी अन्नाचे सेवन करत तसेच मासाहारही करत.
कला व स्थापत्य : - राष्ट्रकूट काळात कला व स्थापत्य क्षेत्रामध्ये उल्लेखनीय प्रगती झाल्याचे तत्कालीन मंदिर व शिल्पातून दिसून येते. वेरूळचे कैलास लेणे हे एकाश्म दगडात कोरलेले व जगप्रसिद्ध असलेले मोठे लेणे होय.
थोडक्यात, राष्ट्रकुटांच्या काळात महाराष्ट्राची सामाजिक, आर्थिक व सांस्कृतिक प्रगती झाल्याचे स्पष्ट होते.

वेरूळचे कैलास लेणे
 शिलाहार घराणे :
 शिलाहार राजे प्रथम राष्ट्रकुटांचे व नंतर चालुक्य व यादवांचे अंकित झाले. चालुक्य राजा दुस-या पुलकेशीने आपला मुलगा चंद्रादित्य यास सामंत म्हणून इ. स. ६३० च्या सुमारास नेमले व चांदोर (सध्याचे चंद्रपूर) ही राजधानी बनवली. इ. स. ७६५ च्या सुमारास राष्ट्रकूट राजा कृष्ण प्रथमने हा भाग जिंकून शिलाहारांना येथील सामंत म्हणून नेमले. शिलाहारांनी गोमंतक येथील वलीपट्टण येथे आपली राजधानी बनवली. शिलाहारांची महाराष्ट्रात दक्षिण कोकण, उत्तर कोकण (ठाणे) आणि कोल्हापूर या तीन ठिकाणी सत्ता केंद्रे निर्माण झाली.
दक्षिण कोकणचे शिलाहार  :- या घराण्याचा मूळ संस्थापक विद्याधर जीमुतवाहन हा असून तो उस्मानाबाद जिल्ह्यातील तगर (तेर) हे याचे मूळ स्थान होय. सोनेरी गरुड पक्ष्याचे चिन्ह' हे जीमुतवाहन राजघराण्याच्या निशाण्यावर असल्याचे दिसून येते. सणफुल्ल, धम्मीयार, अवसर पहिला, इंद्रराज, अवसर तिसरा, रठ्ठराज असे काही राजे या घराण्यात होऊन गेले. खारेपाटण ताम्रपटातील रठ्ठराज हा शेवटचा राजा असल्याचे दिसून येते.
उत्तर कोकणचे शिलाहार : - दक्षिण कोकणातील शिलाहारापेक्षा कमी प्राचीन असलेले घराणे म्हणजे उत्तर कोकणचे शिलाहार होय. कपर्दी' हा या घराण्याचा मूळ पुरुष होय. प्रारंभी हा राष्ट्रकुटांचा मांडलिक होता. या घराण्यातील राजांमध्ये पुल्लशक्ती, झंझ, पहिला व दुसरा वज्जड, छित्तराज, अपरार्क पहिला, मल्लिकार्जुन व सोमेश्वर असे अनेक राजे होऊन गेले. उत्तर कोकणच्या शिलाहार राजांची प्रथम राजधानी दण्डराजापुरी नंतर ठाणे व काही काळ घारापुरी येथे वास्तव्यास असल्याचे संकेत मिळतात.
कोल्हापूरचे शिलाहार : - शिलाहारांचे तिसरे घराणे कोल्हापूर, मिरज, क-हाड व कोकणच्या काही भागांवर राज्य करत होते. सुवर्ण गरुड ध्वजाचे चिन्ह यांनीही राजघराण्याची निशाणी म्हणून वापरल्याचे दिसते. जतिग हा या घराण्याचा मूळ पुरुष असून तो प्रारंभी राष्ट्रकुटांचा  माडलिक होता. या घराण्यातील अन्य राजांमध्ये न्यायवर्मा, चंद्र, जतिक दुसरा, मारसिंह, दुसरा गुहल, पहिला भोज, बल्लाळ, गडरादित्य, विजयादित्य व दुसरा भोज असे राजे होऊन गेले.
   दुसरा भोज हा या घराण्यातील प्रसिद्ध राजा होऊन गेला. त्याने कोल्हापूर, वळिवडे व पन्हाळा या राजधान्या बनवल्याचा उल्लेख शिलालेखात सापडतो. याने दान दिल्याचा एक शिलालेख कोल्हापूरच्या अंबाबाईच्या मंदिरात असून त्याची लिपी देवनागरी व भाषा संस्कृत आहे. याने गगनबावडा, भुदरगड, खेळणा, पन्हाळा, पावनगडे, सामनगड व वाईजवळील पांडवगड असे पंधरा किल्ले बांधल्याचा उल्लेख सापडतो.
शिलाहारांचे योगदान : - शिलाहारकालीन समाज हा ब्राम्हण, क्षत्रिय, वैश्य व शुद्र या जातींमध्ये विभागला होता. जातीनिहाय व्यवसाय केले जात. भोजनामध्ये शाकाहारी व मांसाहारी अन्नाचा समावेश असे. सुतार, लोहार, कुंभार, चांभार, पाथरट यांच्या उदयोगाबरोबरच धातू उद्योग, कापड उद्योग , हस्तिदंती उद्योगही या काळात चालत असत. शेती हा या काळातील लोकांचा प्रमुख व्यवसाय होता.
 शिलाहार राजे जैन धर्माचे अनुयायी होते. यांनी कोल्हापूर, खिद्रापूर येथे जैन मंदिरे बांधल्याचे उल्लेख मिळतात. हे धर्मसहिष्णू राजे होते. त्यांनी हिंदू धर्मीयांसाठी मंदिरे व बौद्ध भिख्खूच्या निवासासाठी विहारे बांधली. अशा प्रकारे शिलाहार राजांनी सामाजिक, आर्थिक, धार्मिक व सांस्कृतिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केले.                               
 गोड घराणे :
  प्राचीन महाराष्ट्रामध्ये शेवटच्या काळात हूण व मुस्लिम आक्रमणांमुळे महाराष्ट्रामध्ये राजकीय अस्थिरता निर्माण झाली. या वेळी महाराष्ट्रात यादवांनी देवगिरी येथे आपली सत्ता प्रस्थापित केली. याच काळात चांदा (चंद्रपूर) येथे गोंड घराण्याने आपली सत्ता प्रस्थापित केली..
ऐतिहासिक साधने  : - १८६९ मध्ये मेजर ल्युसी स्मिथने गोंड घराण्याच्या इतिहासावर सर्वप्रथम प्रकाश टाकला. यांनी स्थानिक परंपरा, हस्तलिखिते व मौखिक साधनांद्वारे हा इतिहास लिहिला. शिलालेख व इतर साहित्यिक साधनांद्वारेही गोंड घराण्याच्या इतिहासावर प्रकाश पडतो.
राजकीय परिस्थिती : - कोल भील हा या घराण्याचा संस्थापक होय. त्याने विखुरलेल्या गोंड जमातीला एकत्र करण्याचे व नाग वंशीयांविरुद्ध लढा देण्याचे तंत्र शिकवण्याचे काम केले. भीम बल्लाळ सिंहापासून गोंडांचा इतिहास लिखित स्वरूपात पाहावयास मिळतो. याने शिरपूर येथे राजधानी हलवली. केशरसिंगाच्या काळात यांच्या साम्राज्याचा विस्तार भिल्ल देशापर्यंत झाला. या राजांच्या काळात गोंड घराण्याचा सर्वाधिक संपन्नतेचा काळ होता. घोडे व बैल यांच्या संख्येतही या काळात वाढ झाली. दिनकर सिंग हा एक 'शांतताप्रिय, कला, विद्या व साहित्याचा भोक्ता असलेला राजा होउन  गेला. अनेक कवी व विद्वानांना याने आपल्या दरबारात आश्रय दिला नंतरच्या काळात सुर्जा बल्लाळ सिग हा महत्त्वपूर्ण राजा होऊन गेला त्याने बनारस व लखनऊ येथे जाऊन युद्ध व संगीत (गाणे) या कलांचे शिक्षण घेतले.
 खांडख्या बल्लाळ शाहने १४३७-१४६२ पर्यंत राज्य केले हा त्वचारोगाने त्रासला होता. पत्नीच्या सल्याने बल्लाळपूर येथे तो किल्ला बांधून राहू लागला व राजधानीचे शिरपूरहून बल्लाळपूर येथे स्थलांतर केले. तसेच याने अचलेश्वराचे मंदिर बांधले. गादीवर आलेल्या हिरशाह याने मंदिराच्या तटबंदीचे काम पूर्ण केले. याने जंगले स्वच्छ करून जनतेला राहण्यासाठी वस्तीची सोय करून दिली, कृष्ण शाह, बीर शाह, गोविंद शाह, हिराई, राम शाह, नीलकंठ शाह, असे राजे होऊन गेले.
 नीलकंठ शाहच्या काळात चांदा प्रातावर रघुजी भोसले आक्रमण झाले व त्याला रघुजी भोसल्यांनी कैद केले. कैदेतच त्याचा मृत्यू झाला व नागपूरच्या रघुजी भोसलेच्या प्रदेशात हा भाग समाविष्ट करण्यात आला.
गोंड घराण्याचे योगदान : - ६२ गोंड राजांनी अनेक शतके महाराष्ट्रातील देवगड, नागपूर, चंद्रपूर या प्रदेशांवर राज्य केले.
 गोंड राजे हे कला, साहित्य व विद्येचे भोक्ते होते. त्यांनी आदिवासी जमातीतील लोकांना संघटित केले. त्यांना लष्करी प्रशिक्षण दिले. तसेच त्यांचा विकास घडवून आणला. एकंदरीत आदिवासी समाजाला इतिहासात स्थान मिळवून देण्याचे काम गोंडांनी केले. म्हणूनच यांच्या वैभवशाली कालखंडाची नोंद इतिहासात होणे आवश्यक ठरते.
संदर्भग्रंथ :-
१)  ब्रिटीश गॅझेटीयर 
२) सांगाती सह्याद्रीचा
३) भारताचा इतिहास - प्रा.प्रशांत देशमुख

सम्राट अशोकांचा ९ वा शिलालेख
 हा शिलालेख इ.स. पुर्व ( ख्रिस्त पुर्व ) ३ ऱ्या शतकातील आहे.  मुंबई जवळ असणाऱ्या अत्यंत प्राचिन  सोपारा ( आजच्या विरार जवळील नालासोपारा ) या ठिकाणचा हा शिलालेख आहे ! सोपारा ( आजचे नालासोपारा ) याचे अनेक ऐतिहासिक संदर्भ आजही उपलब्ध आहेत.

सदर शिलालेख हा इ. स. पुर्व ३ ऱ्या शतकात सम्राट अशोकाने धर्मप्रचारासाठी  मौर्य ब्राम्ही लिपीत लिहिलेला आहे.

यात असं लिहिल आहे की,
सम्राट अशोक असे म्हणत आहे की....

"रोगराई, विवाह, जन्म, यात्रा याप्रसंगी सामान्य ( हिंदू ) माणसे अनेक धार्मिक विधी करतात. ( धार्मिक विधी फक्त हिंदू धर्मात होतात ) अशावेळी माता आणि पत्नी अनेक धार्मिक विधी करतात. ( हिंदू स्त्रिया आजही हे करतात )

शिलालेखात सम्राट अशोक पुढे लिहितात ...

" …धार्मिक विधी निश्चित कराव्यात  ( अस अशोक सम्राट म्हणतात  ) पण याच्या सोबतच ( धार्मिक विधी सोबतच ) सदाचाराचे फळ चांगले मिळते.  ( सदाचार म्हणजे चागले आचार / विचार )

पुढे लिहिल आहे की ...

बंदी, दास - दासी यांना माणुसकीने वागविणे. ज्येष्टांचा आदर करावा पशुपक्षांवर दया दाखवणे.   ब्राह्मण आणि श्रमणांप्रति औदार्य असणे  ही सदाचाराची कामे आहेत ....

सम्राट अशोक सांगतात...

...ब्राह्मण आणि श्रमणांप्रति औदार्य बाळगा अस म्हणतात

आता मला सांगा सम्राट अशोकांचा वारसा सांगणारे कितीजण सम्राट अशोकांचे हे मत मानतात ?

सम्राट अशोकांनी बौद्ध धर्म वाढवला असे म्हटले जाते. त्याच अशोकांचे दुसरे मत असे की, ब्राह्मणांप्रति औदार्य ( आदर ) दाखवा हे सदाचाराचे काम आहे.

सरसकट ब्राम्हणांवर टिका करणाऱ्या त्या मुर्ख लोकांना सम्राट अशोकांचे हे सदाचाराचे काम पटतयं काय ? की स्वतःचेच खरं करण्याच्या किंवा कोणीतरी बोंबलतयं म्हणून आपणही बोंबलायचं या नादात सत्य नाकारतोय ?

आता असं म्हणू नका की हा शिलालेख खोटा आहे म्हणून ... हा शिलालेख आजही तुम्हाला मुंबईतील छत्रपती श्रीशिवाजी महाराज संग्रहालयात पहायला मिळेल फक्त डोळे उघडे ठेवण्याची आणि  तो शिलालेख वाचण्याचा मनाचा मोठेपणा तुमच्या जवळ असायला हवा !

प. पू. डॉ. बाबासाहेब आंबेडकर नेहमी म्हणायचे 'वाचाल तर वाचाल !' म्हणून हा शिलालेख जरी ब्राम्ही लिपीतील असला तरी त्याचे मराठी भाषांतर उपलब्ध आहे. तो नक्की वाचा आणि आपण सर्व मिळून सम्राट अशोक म्हणतात तसं ब्राह्मण आणि श्रमणांप्रति आदर दाखवून सदाचाराची कामे करुयात !

                       आपला
            © बळवंतराव दळवी

सर्व हक्क लेखकाधीन
=======

महा news आपल्या हक्काचे news चैनल

इथे पहा -

महा News online youtube news  चैनल

https://www.youtube.com/channel/UCF4sJQcvThTmi3tN071O4iA?view_as=subscriber

आपल्या हक्काच्या Online News चैनलचे हक्काचे फेसबुक पेज
महा News Official फेसबुक पेज
https://www.facebook.com/MahaNewsOfficialpage/

आपल्या हक्काच्या Online News चैनलचे हक्काचे Twitter Ac
महा News Twitter Ac
(@MahaNews18): https://twitter.com/MahaNews18?s=08

Copyright © 2018 All right reserved


महाराष्ट्राचा इतिहास व मराठीची उत्पत्ती
 महाराष्ट्रराज्यस्थापनेचं हे सुवर्णमहोत्सवी वर्ष. संयुक्त महाराष्ट्राचे एक शिल्पकार असलेल्या आचार्य अत्र्यांनी 'माझ्या महाराष्ट्राला इतिहास आहे, बाकीच्या राज्यांना फक्त भूगोल आहे', असे उद्गार काढले होते. आज एकविसाव्या शतकाच्या प्रारंभी सामाजिक, आर्थिक, सांस्कृतिक स्थित्यंतरं वेगाने घडत असताना महाराष्ट्र व मराठी या दोहोंच्या भविष्याची आखणी करणं गरजेचं झालं आहे. मात्र भविष्याचा वेध घेताना भूतकाळ तपासून बघणं आवश्यक ठरतं. आचार्य अत्र्यांनी उल्लेखलेल्या इतिहासाचा वेध हा महाराष्ट्राच्या व मराठीच्या भूतकाळाचा प्रवासच आहे महाराष्ट्र हे नाव तसं फार जुनं नाही. वराहमिहिराच्या ग्रंथात (इ.स. ५०५) आणि सत्याश्रय पुलकेशी याच्या इ.स. ६११ सालातील बदामीच्या शिलालेखात महाराष्ट्राचा प्रथम उल्लेख सापडतो. आपण हल्ली ज्या प्रदेशाला महाराष्ट्र म्हणतो, तो पूर्वी दक्षिणापथ या नावानं ओळखला जात असे. दक्षिणापथ म्हणजे दक्षिणेकडील मार्ग व दक्षिणेच्या मार्गावरील प्रदेश. दक्षिणेकडील प्रदेशाची नीटशी कल्पना उत्तरेकडील आर्यावर्तांत राहणार्‍या आर्यांना नसल्यामुळे त्यांनी या अज्ञात प्रदेशाला दिशादर्शक असं मोघम नाव दिलं. 


 दक्षिणापथ हे नाव तसं पुरातन आहे आणि ते विंध्यपर्वताच्या दक्षिण परिसराच्या खालच्या प्रदेशास लावण्याचा प्रघात होता. ख्रिस्तपूर्व काळातील पेरिप्लुस (सागरी मार्गाचे नकाशे) या दृष्टीने महत्त्वाचे ठरतात. त्यांत दक्षिणापथ या देशास Dakhinabhades असं नाव देऊन त्यांत भडोचपासून (Bargaza) द्रविड देशातील (Damiriea) व्यापारी पेठेच्या शहरांपर्यंतचा अंतर्भाव केलेला आहे. हे जे दामिरिच म्हणून शहर पेरिप्लुसांत लिहिले आहे, ते मार्कंडेय पुराणात सांगितलेलं दामरह नावाचं शहर असावं. इ. स. ३३०च्या सुमारास राज्य करणारा समुद्रगुप्त राजा आपल्या शिलालेखांत दक्षिणापथ म्हणजे नर्मदा नदीपासून थेट कन्याकुमारीचा प्रदेश असं म्हणतो. याच्या पुढचा ६०० वर्षांनंतरचा राजशेखर (इ.स. ९००-९४०) नावाचा ग्रंथकार हा आर्यावर्त आणि दक्षिणापथ या दोन प्रदेशांच्यामधील मर्यादा रेवा नदी असल्याचं सांगतो. याच काळातला चालुक्य कुळातील पहिला राजरज (इ. स. ९८५) हा दक्षिणापथाची मर्यादा नर्मदेपासून रामाच्या सेतूपर्यंत नेऊन या दोन्हींमधील प्रदेश पहिल्या विष्णुवर्धनाने (इ.स.६००) जिंकल्याचं सांगतो 
निरनिराळ्या काळातल्या ग्रंथकारांनी दक्षिणापथाची मर्यादा ही अशी सांगितली आहे. उत्तरमर्यादा नर्मदा आणि दक्षिणमर्यादा मात्र अनिश्चित अशी दक्षिणापथाची स्थिती होती. कधी कधी महाराष्ट्र व दक्षिणापथ ही दोन्ही नावं एकाच प्रदेशास अनुलक्षून स्थूल अर्थानं वापरलेली दिसतात. या दक्षिणेकडील प्रदेशाची आर्यांना फारशी माहिती नव्हती. त्यांच्या परिचयाचे प्रदेश म्हणजे आर्यावर्त आणि मध्यप्रदेश. तिथेच त्यांचं मांत्रिक पठण, यज्ञकर्मं वगैरे चालत असे. या देशाच्या पलीकडे कोणी आर्य गेलेच तर व्रात्य म्हणून पतित होत आणि पुन्हा आर्यांच्या समाजात सामावून घेण्यासाठी त्यांना व्रात्यस्तोमासारखे विधीही करावे लागत. आर्यावर्ताच्या बाहेर जाण्यासंबंधी असे सक्त निर्बंध असल्यामुळे सामान्य जनतेचा चौफेर संचार नव्हता. दक्षिणेकडे जायचं म्हणजे वनवासात जायचं असा प्राचीन काळी समज होता. या धार्मिक निर्बंधांबरोबरच निसर्गही फारसा अनुकूल नसल्यानं दक्षिणप्रांत आर्यांच्या ताब्यात येण्यासाठी उत्तरेकडील प्रदेशापेक्षा जास्त वेळ लागला. विंध्य, पुढे सातपुडा, दोन्ही बाजूंस सह्याद्रीच्या डोंगराळ खबदाडी. असा खडतर प्रवास उत्तरेकडील संपन्न व समृद्ध प्रांतांत सुखावलेले आर्य का ओढवून घेतील? म्हणूनच पुष्कळ काळ दक्षिणेकडील प्रांत आर्यांच्या दृष्टीने दंडकारण्यच राहिला.
महाराष्ट्राच्या वसाहतीसंबंधी एक पौराणिक आणि दुसरं ऐतिहासिक, अशी दोन मतं मांडता येण्यासारखी आहेत. या दोन्ही मतांत काळाच्या दृष्टीने फार अंतर आहे. यांपैकी पौराणिक मत आपण प्रथम पाहू. पौराणिक दृष्टीने महाराष्ट्रातील वसाहत ऋग्वेदसूक्तांच्या संहितीकरणापूर्वी, किंबहुना ऋग्वेदात उल्लेखलेल्या दाशराज्ञ युद्धापूर्वी झाली, असं म्हणता येतं. पौराणिक मत डॉ. केतकर यांनी आपल्या प्राचीन महाराष्ट्र या ग्रंथात मांडलं आहे. महाराष्ट्राचे स्थूलमानाने अपरान्त, विदर्भ आणि दंडकारण्य असे तीन भाग पडतात. त्यांपैकी पश्चिमेकडील अपरान्त (कोकणपट्टी) भृगु आणि त्याच्या वंशजांनी फार प्राचीन काळी, म्हणजे भार्गवरामाच्या - परशुरामाच्या- अवताराच्याही पूर्वी वसवल्याचं पुराणांवरून ठरतं. कोकण म्हणजे परशुरामाची कर्मभूमी आणि परशुरामाच्या कथेशी कोकणातील कोकणस्थ, देवरुखे, हैंग, नंबुद्री इत्यादी अनेक जातींचा संबंध येतो. भडोचचे जुने नाव भृगुकच्छ असं आहे. परशुरामाचं पूजन कोकणात अनेक ठिकाणी होतं. सोपार्‍यात आजही परशुरामाच्या अनेक मूर्ती आहेत. पश्चिम भाग जसा भृगुंनी तसा पूर्व भाग अगस्त्यांनी वसवला. या दोन पट्ट्यांच्या मधला भाग मात्र शापदग्ध असल्याने तितकासा वसाहतयोग्य नव्हता. इक्ष्वाकुवंशातील दण्डक नावाच्या राजाने भृगुवंशातील च्यवन नावाच्या ऋषीचा अपमान केल्यामुळे ऋषीने दण्डक राजाला शाप दिला. त्या शापाच्या प्रभावाने विंध्यापासून सेतुबंधापर्यंतचा प्रांत अरण्यमय झाला. दण्डकारण्य या नावाची ही उत्पत्ती.
कोकणासंबंधी निरनिराळ्या कथा पुराणांत आहेत. सह्याद्रीच्या उपप्रांतांत आपल्या पर्वतप्राय लाटा आदळून त्याच्या उच्चत्वाच्या स्पर्धेनं सूड घेणार्‍या समुद्रास परशुरामाने मागे हटवून आपल्यासाठी व आपल्या यज्ञकर्मासाठी भूमी तयार केली आणि चैत्यपुलिन (चिपळूण) इथे स्थंडिल तयार करून त्यासाठी कोळ्यांच्या जाळ्यांची जानवी करून त्यांना ब्राह्मणांची दीक्षा देऊन किंवा चितेवरील प्रेतांत प्राणज्योती पेटवून त्यांना ब्राह्मण्य दिले वगैरे कथा प्रसिद्ध आहेत. या प्रांतास पूर्वी अपरान्त म्हणत असत व त्याची मर्यादाही मोठी, म्हणजे उत्तरेला आनर्तापासून ते थेट कन्याकुमारीपर्यंत, अशी होती. या प्रांतास कोकण कधी म्हणू लागले, यासंबंधी ठाम प्रमाण मिळत नाही. नागांची जी कुळं महाभारतात सांगितली आहेत, त्यांत कुकुण असं एक कूळ आहे, आणि ते या प्रांतात खाली गोकर्णापर्यंत राहत होते, असा एक दाखला आहे. तेव्हा या कुकुण नागकुलाचा आणि कोकण या नावाचा काही संबंध असू शकतो.
कोकण या नावाची उपपत्ती आजपर्यंत पुष्कळांनी निरनिराळ्या प्रकारांनी दिली आहे. जुन्या संस्कृत आणि फारसी ग्रंथांत कोकण हा शब्द निरनिराळ्या प्रकाराने लिहिलेला आढळतो. संस्कृतात कुकुण, कुङ्कुण, कोङ्कण, कोंकण ही रूपं दिसतात, तर फारसीमध्ये केङ्केम, कंकण, कोंकम् ही रूपं दिसतात. या कोकण शब्दाच्या व्युत्पत्तीबद्दल अनेक मतप्रवाह दिसतात.
१. कोकण हा शब्द द्राविडी भाषेतून घेतला असावा.
२. कानडीत कोङ्कु असा एक शब्द आहे. त्याचा अर्थ उंचसखल जमीन असा आहे. कोङ्कु + वन = कोङ्कुवन = कोकण अशा मार्गाने हा शब्द आला असावा.
३. फारसीमध्ये कोह (=पर्वत), कुण्ड (=खाच, खड्डा) असे दोन शब्द अहेत. कोहकुण्ड = कोकुण्ड = कोकण अशा मार्गाने हा शब्द येतो. त्याचाही अर्थ पर्वतांच्या खाचांचा प्रदेश असा होतो.
४. किम् + किण्वम् (कसली ही वनस्पती?) अशा तर्‍हेचा प्रश्न पहिल्या वसाहतकारांनी उन्मादक ताडीसंबंधी विचारला असावा व त्यावरून कोकण हा शब्द आला असावा.
५. कोंग नावाचे रानटी लोक प्रथम या प्रांतात वसले असावेत आणि त्यावरून या देशास कोंगवन (=कोकण) हे नाव मिळालं असावं.
कोकणाचा व इतर बाह्य प्रांतांचा व्यापाराच्या दृष्टीनं संबंध फार पुरातन काळचा आहे. इतर देशाचे व्यापारी हिंदुस्थानाशी जो व्यापार करत तो कोकणातूनच होत असे. पुष्कळ अरबी शब्द जे दक्षिणेकडील भाषांत सापडतात, ते याच काळात आले असावेत. इसवी सनापूर्वी चार शतकांपूर्वीपासून हा व्यापार चालत असावा. सह्याद्रीच्या पलीकडे असलेलं दंडकारण्य मात्र या देवघेवीपासून अलिप्त होतं. कोकणातील पुष्कळ बंदरांचा उल्लेख जुन्या लेखांमध्ये सापडतो. टोलेमी (इ. स. १५०) याच्या Geographia या भूगोलविषयक ग्रंथात सिमुल्ल (Simulla) किंवा तिमुल्ल (Timula) असा जो उल्लेख येतो, किंवा त्याही पूर्वी प्लिनीने (इ.स. २००) पेरिमल (Perimula) असा जो उल्लेख केला आहे, किंवा कान्हेरीच्या शिलालेखांत (इ. स. २००) चेमुल्ल म्हणून जे बंदर उल्लेखलेलं आहे, ते कोकणातलं चेऊल किंवा चोल होय. याशिवाय पाल, कोल, कुड, राजपुरी, घोडेगाव या गावांचाही उल्लेख आहे. उत्तरेकडचं शूर्पारक (सोपारा) हे तर मौर्यांच्या राजवटीत एक स्तूप तिथे उभारण्याइतकं महत्त्वाचं होतं. या बंदरांतून माल आत थेट नाशिक - पैठणपर्यंत पोहोचवला जात असे. काही यवन लोक बौद्धधर्म स्वीकारून कोंकणात वस्ती करून होते, असं दिसतं. कारण कान्हेरी, नाशिक, कार्ले, जुन्नर इथल्या विहारांना त्यांनी मोठ्या प्रमाणात देणग्या दिल्या होत्या.
टोलेमी हा कोकणाचे पुढीलप्रमाणे चार विभाग करतो -
१. सौराष्ट्र - उत्तर गुजरात
२. लारीके - लाट, दक्षिण गुजरात
३. आरिआके = मराठा देश
४. दामरिके = दामिल, म्हणजे तामिळ लोकांचा प्रदेश .
यांपैकी तिसरा जो आरिआके, किंवा आर्यक म्हणजे आर्यांचा प्रदेश, त्याचे पुन्हा तीन भाग केले आहेत. पहिल्या भागात मुंबई व दक्षिणेचा काही भाग येतो. दुसरा भाग उत्तर कोकण, दमणपासून खाली राजापूरपर्यंत, आणि तिसरा भाग दक्षिण कोकण. या भागांना अनुक्रमे १. Arisake Proper २. Sadan's Ariake ३. Pirate Ariake असं तो म्हणतो.
विदर्भ - अगस्त्य ऋषींचा प्रवास, त्यांचं विदर्भ राजाच्या मुलीशी, लोपामुद्रेशी झालेले लग्न, कौंडिण्य नावाचा ऋषी, भीष्मकाची राजधानी, नलदमयंतीचा विवाह वगैरे सर्व गोष्टी पौराणिक माहितीत मोडतात. दक्षिणेकडील प्रदेशांचं आर्यीकरण सुरू झालं ते प्रथम विदर्भातच, म्हणून विदर्भाचा संबंध आर्यांच्या ग्रंथांत यावा हे साहजिकच आहे. विदर्भ हे जे नाव या प्रांताला मिळालं ते एका राजाच्या नावावरून मिळालं आहे. यदुवंशापैकीच भोज या नावाची जी एक शाखा होती, त्या शाखेचं राज्य या प्रांतावर होतं. त्या शाखेत विदर्भ भोज नावाचा एक राजा होऊन गेला व त्याच्यावरूनच या प्रदेशाला विदर्भ हे नाव मिळालं. ऋषभदेव नावाचा जो राजा होता त्याला नऊ मुलगे होते व त्यानं आपल्या नऊ पुत्रांना स्वत:चं भरतखंडाचं राज्य वाटून दिलं. जो देश ज्या पुत्रास मिळाला त्या देशास त्या मुलाच्या नावावरून नाव मिळालं. कुशावर्त, इलावर्त इत्यादी मुलांमध्ये विदर्भ नावाचाही एक मुलगा होता व त्याच्या वाट्यास हा देश आला, म्हणून त्याला त्याचं नाव मिळालं, अशीही एक कथा प्रचलित आहे. त्याच विदर्भानंतर काही पिढ्यांनी भीम आला. अजपत्नी इंदुमतीचा भाऊ भोज याच विदर्भ राजाच्या वंशातला. त्याच वंशात क्रथकैशिक, भीष्मक, रुक्मी व चंपू रामायणाचा कर्ता भोज हे सर्व होऊन गेले. या प्रांतातील स्त्रिया त्यांच्या सौंदर्याबद्दल वगैरे प्रसिद्ध असत. म्हणून इथल्या राजकुलातील कन्येशी विवाह करायला अनेक राजे उत्सुक असत. या सर्व पौराणिक संदर्भावरून इतकं स्पष्ट होतं की, विंध्यदक्षिण प्रांतात आर्यसंस्कृती सर्वप्रथम विदर्भातच रुजली. प्रथम या प्रांताचं आर्यीकरण पूर्ण झालं आणि सरस्वतीदृषद्वतीच्या काठावर जे ब्रह्मकर्म चाले, तेच ब्रह्मकर्म वर्धानदीच्या काठी सुरू झालं.
विदर्भास वर्‍हाड असंही म्हणतात. वर्‍हाड हा शब्द विदर्भावरून आला असावा, असं वाटणं साहजिक आहे, परंतु वर्‍हाड आणि विदर्भ हे दोन्ही शब्द वर्णपरिणतीच्या दृष्टीनं एकच समजणं अवघड आहे. अबूल फजल हा आपल्या ऐनेअकबरी या ग्रंथात वर्धातट हे या प्रांताचं नाव देतो. वाचस्पत या ग्रंथात विगता: दर्भा: - कुशा: यत: असा विदर्भ या शब्दाचा विग्रह केला आहे. राजवाडे हे त्या शब्दाचे वर्धा + आहार असे दोन भाग पाडून वर्‍हाड या शब्दाची व्युत्पत्ती सांगतात.
या प्रांतांचे उल्लेख फार प्राचीन काळापासून आढळून येतात. छान्दोग्योपनिषदात कौण्डिण्य नावाच्या ऋषीचा उल्लेख आहे. त्याच्या नावावरून कौण्डिण्यपूर हे गाव वसलं. हेच पुढे नलदमयंतीच्या वेळी भीष्मकाची राजधानी म्हणून प्रसिद्धीस आलं. कलिंग (पूर्वेकडील कोकणपट्टी) व अपरान्त यांचेही असेच उल्लेख सापडतात. महाराष्ट्रे तीन होती व ती अश्मक, कलिंग व अपरान्त असा उल्लेख महाभारतात आहे  

 या प्रांतांचे उल्लेख फार प्राचीन काळापासून आढळून येतात. छान्दोग्योपनिषदात कौण्डिण्य नावाच्या ऋषीचा उल्लेख आहे. त्याच्या नावावरून कौण्डिण्यपूर हे गाव वसलं. हेच पुढे नलदमयंतीच्या वेळी भीष्मकाची राजधानी म्हणून प्रसिद्धीस आलं. कलिंग (पूर्वेकडील कोकणपट्टी) व अपरान्त यांचेही असेच उल्लेख सापडतात. महाराष्ट्रे तीन होती व ती अश्मक, कलिंग व अपरान्त असा उल्लेख महाभारतात आहे.
प्राचीन भारतातील सोळा महाजनपदे - अश्मक
विदर्भाची विदर्भ, कैशिक, भोज, भोजकट, वर्धातट व महाराष्ट्र अशी सहा नावं आहेत, व विदर्भ आणि महाराष्ट्र ही नावं समान अर्थानं वापरली आहेत. त्याला आधारही जुन्या ग्रंथांत मिळतो. राजशेखर कवीच्या बालरामायण नावाच्या नाटकात एक प्रसंग आहे. पुष्पक विमानात बसून श्रीराम, सीता व सुग्रीव हे तिघं लंकेहून परत जात असता सुग्रीव प्रत्येक देशाचं वर्णन करतो -
सुग्रीव - भरताग्रजायमग्रे महाराष्ट्रविषय: ।
राम - सोऽयम् सुभ्रु परो विदर्भविषय: सरस्वतीजन्मभू: ।
सीता - यत्रोत्पना मे पितामहश्वशुरस्य गृहिणीन्दुमती ।
त्याचप्रमाणे मुरारी हा कवीही आपल्या अनर्घ्यराघव या नाटकात इदमग्रे महाराष्ट्रमण्डलैकमण्डनं कुण्डिननाम नगरम् । असा, कुंडिननगर ही महाराष्ट्राची राजधानी म्हणून उल्लेख करतो.
विदर्भ म्हणजे महाराष्ट्र असे जसे उल्लेख सापडतात तसेच अपरान्त म्हणजे महाराष्ट्र असे उल्लेखही सापडतात. यावरून महाराष्ट्र या देशाची व्याप्ती नीट ठरली नव्हती, असं दिसतं. महाभारतात गोपराष्ट्र, मल्लराष्ट्र, पांडुराष्ट्र अशा महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या उपभागांचा उल्लेख आहे. गोपराष्ट्र म्हणजे गोपांचा देश. मथुरेजवळच्या गोपांचे हे भाऊबंद असावेत. नाशिकजवळचा हा प्रदेश होता. दुसरं मल्लराष्ट्र. हे मल्ल रानटी लोक होते. त्यांचं निर्दालन खंडोबानं केलं म्हणून त्याला मल्लारी हे नाव मिळालं. मल्ल हा शब्द अनेक नावांच्या शेवटीही येतो. मल्ल याचा अर्थ पर्वत असाही होतो, तेव्हा मल्लराष्ट्र म्हणजे डोंगराळ प्रदेश, असा अर्थही संभव आहे. गोपराष्ट्राच्या खाली हे मल्लराष्ट्र होतं. पांडुराष्ट्र म्हणून जो उल्लेख येतो, तो पाण्ड्यांच्या प्रदेशाबद्दल आहे. सध्याच्या तामिळनाडूतील हा भाग. याचाही अंतर्भाव तेव्हा महाराष्ट्रात होत असावा. याशिवाय, समुद्रगुप्ताच्या एका शिलालेखात देवराष्ट्राचा उल्लेख आहे. हे देवराष्ट्र सातारा जिल्ह्यात दक्षिणेला आहे. ही सर्व राष्ट्रं व अस्मक, अपरान्त, विदर्भ मिळून महाराष्ट्र बनला होता.
आर्यांची जी वस्ती दक्षिणेस झाली ती काही एकदम व सर्व ठिकाणी सारखी अशी झाली नाही. क्रमाक्रमानं सावकाश व दीर्घ कालावधीनं जसजसं तिथलं जंगल कमी होऊन भूभाग वसाहतयोग्य होऊ लागला तसतसे आर्य आपला शिरकाव दक्षिणेत पुढे पुढे करू लागले. स्थूलमानानं व निसर्गाचे निर्बंध लक्षात घेता महाराष्ट्राचे भाग उत्तरेकडून दक्षिणेकडे नागपूर-विदर्भ, गोदाकाठ, भीमाकाठ, कृष्णाकाठ, उत्तर कोकण, दक्षिण कोकण इतके पडतात, व याच क्रमाने आर्यांनी तिथे वसाहती केल्या. याला अपवाद फक्त कोकण. देशापेक्षा फार अगोदर कोकणपट्टीवरील प्रांत वसवला गेला होता. एवढंच नव्हे तर व्यापारउदीम वगैरे व्यवहाराच्या दृष्टीनं इतर तत्कालीन देशांतील लोकांनाही तो परिचित झाला होता. शिवाय, उत्तरेचं दळणवळण कोकणाशी होण्यास तिथला मार्गही विशेष बिकट नव्हता. उत्तरेकडील आर्य किंवा पुढे जे जे लोक वसाहतीसाठी दक्षिणेत येऊ शकले ते या कोकणपट्टीच्या मार्गानेच येत. तेव्हा हा प्रांत फार अगोदर वसवला गेला, यात शंका नाही.
आर्यांच्या पूर्वी विंध्याच्या दक्षिणेस कोण लोक राहात होते व ते तेथे कुठून आले यासंबंधी संशोधकांमध्ये एकवाक्यता नाही. युरोपीय संशोधकांचा असा समज आहे की, आर्य ज्या वेळी आपल्या मूळ वसतिस्थानाहून निघाले व इतर वसाहतयोग्य प्रांतांत ठिकठिकाणी राहू लागले, त्या वेळी जशी एक लोकक्रांती झाली, तशीच जबरी लोकक्रांती मध्य आशियातून द्राविडी किंवा सुमेरी अथवा तुराणी संस्कृतीचे लोक आर्यांच्या पुष्कळ पूर्वी इतस्तत: फ़िरू लागले त्या वेळी झाली. तेच लोक आर्यांप्रमाणे हिंदुस्थानाकडे वळले आणि उत्तरेकडील पर्वतांच्या दर्‍याखोर्‍यांमधून आत शिरून राहिले. मागाहून जसजसा आर्यांचा रेटा येऊ लागला तसतसे ते उत्तरेकडील डोंगरांच्या खबदाडीत व दक्षिणेकडे विंध्यपार होऊ लागले. अशा रीतीनं दक्षिणेकडे दोन लोकांच्या निरनिराळ्या भिन्न काळी वसाहती झाल्या. एक आर्येतर द्राविडी वगैरे लोकांची आणि दुसरी आर्यांची. या दोन्ही वसाहतींचे नक्की काळ सांगणं कठीण आहे.
  महाराष्ट्राचा इतिहास व मराठीची उत्पत्ती- भाग-5
 
दक्षिणेकडील वसाहतींमध्ये काळाच्या दृष्टीनं दोन स्थूल भाग पडतात. पहिला पाणिनिपूर्व वसाहती व दुसरा पाणिन्युत्तर वसाहती. पहिल्या अनार्यांच्या व दुसर्‍या आर्यांच्या. सर्व अनार्य लोकांत नाग लोकांची संस्कृती उच्च समजली जात असे, व म्हणून त्यांना अनार्य म्हणणं काही संशोधकांना मान्य नाही. उत्तरेकडेसुद्धा त्यांचा आणि आर्यांचा संबंध फार आला. कुश, अर्जुन, भीम या आर्यांचे आणि नागांचे शरीरसंबंध झाले. नागांचा एक कर्कोटक नावाचा वंशज काश्मीरात राज्य करत होता. काश्मीरचा पहिला राजा असलेला नील जातीनं नाग होता असा राजतरंगिणीत उल्लेख आहे. महाभारत व इतर काही पुराणांत नागांचा उल्लेख अनेकवेळा आला आहे. बुद्धाच्या काळात नाग लोक बरेच पुढारलेले होते, कारण गौतमबुद्धानं आपल्या मताचा प्रसार या नाग लोकांमध्येच केला असल्याचं काही भित्तिचित्रांवरून स्पष्ट होतं. गौतमबुद्ध मध्ये बसलेला आणि त्याच्या भोवती कमरेवर नागाचं वेटोळं आणि डोक्यावर नागाची फणी घेतलेले असे नाग लोक बसलेले, असा देखावा या चित्रांमध्ये आहे. हे नाग लोक फार पूर्वी उत्तरेतून दक्षिणेत स्थायिक झाले होते. पाताळ हे त्यांचं वसतिस्थान असा उल्लेख म्हणूनच अनेक ग्रंथांत सापडतो. पाणिनीपूर्व काळात आर्यांच्या आधी नाग लोकांचा प्रवेश दक्षिणेत झाला. नागांचा आणि दक्षिणेकडील प्रांतांचा व विशेषत: पश्चिमेकडील कोकणाचा जास्त संबंध आला. याशिवाय गोंड, भिल्ल, वारली, कोळी, वध्र, मल्ल, काथोडी, कातकरी या एतद्देशीय लोकांच्या वसाहतीही महाराष्ट्रात होत्या.
पाणिनीपूर्व काळात आर्यांची वसाहत विंध्याच्या खाली नव्हती. कारण पाणिनीच्या अष्टाध्यायीमध्ये दक्षिणेकडील कोणत्याही देशाचा उल्लेख नाही. मात्र कात्यायनाच्या वार्तिकांमध्ये व पातंजलीच्या महाभाष्यामध्ये दक्षिणेकडील राज्यांचे स्पष्ट उल्लेख आहेत. कात्यायन व पाणिनी या दोघांमध्ये तीनशे वर्षांचा काळ होता. पाणिमीचा काळ ख्रिस्तपूर्व ७०० आहे. म्हणजे आर्यांचा दक्षिणेशी संबंध त्यानंतरचा आहे.
पाणिनीनंतरच्या काळात आर्य व त्यांच्यावर उपजीविका करणारे काही अनार्य महाराष्ट्रात आले. उत्तर भारतातील राजांच्या जुलमांना कंटाळून, धार्मिक कर्मकांडांवर आलेल्या बंधनांमुळे आणि जैन व बौद्ध धर्माच्या वाढत्या प्रसारामुळे अनेक ब्राह्मणांनी देशांतर केलं. सारस्वत ब्राह्मण पश्चिमेकडील अपरान्ताच्या मार्गानं खाली उतरले तर नंबुद्री ब्राह्मण पूर्वेकडील कलिंगाच्या मार्गानं खाली उतरले. त्याच वेळी काही ब्राह्मण विदर्भात स्थायिक ज़ाले. त्यांच्यापैकी काही खाली खानदेश, नगर व नाशिक प्रांतात उतरले. खानदेश, विदर्भ या प्रांतातेल यजुर्वेदीयांची वसती जुनी असावी. नाशिक, जुन्नर, कान्हेरी येथील शिलालेखांत हे उल्लेख सापडतात.
ब्राह्मणांप्रमाणेच आर्यांपैकी क्षत्रिय, वैश्य, शूद्र व इतर घटकही दक्षिणेकडे महाराष्ट्रात आले असावे. उत्तरेकडील महापद्मादि दुष्ट शूद्र राजांच्या, जैन-बौद्धादि पाखंडांच्या व व्रात्यशूद्रादि उत्पथांच्या जुलुमाला कंटाळून स्वधर्म, स्वराज्य व स्वातंत्र्य यांचा अनुभव घेण्यास दक्षिणारण्यात बौद्धकालाच्या प्रथम ज्वानीत म्हणजे शकपूर्व सहाशेच्या सुमारास वसाहती करण्यास आर्य शिरले, असं इतिहासाचार्य राजवाडे यांनी लिहून ठेवलं आहे. मगधातून जे लोक आले ते महाराष्ट्रीय होत. या महाराष्ट्रीय शब्दाचाच अपभ्रंश महरट्ट असा होतो. महाराष्ट्रिक आणि महाराजिक हे एकच. यांचा उल्लेख महाराजाष्टन् या पाणिनीच्या सूत्रांत आला आहे. हे क्षत्रिय होते. यांची व पुढे उल्लेखलेल्या राष्ट्रिक व वैराष्ट्रिकांची गणराज्ये होती. त्यांत गणनायक असत. अशा तर्‍हेचा एक गणनायक नाणेघाटातल्या कोरीव लेण्यांत खोदला असून त्याखाली महारठीगनकयिरो (महाराष्ट्रीगणकवीर:) असा निर्देश आहे. यांची भाषा मागधी व महाराष्ट्री होती.
क्षत्रियांपैकी दक्षिणेत राष्ट्रिकही आले. अशोकाच्या शिलालेखात (इ. पू. ३२७) जे रास्टिक म्हणून उल्लेखलेले आहेत ते हे राष्ट्रिक. यांचा मूळ देश कुरुपांचल. राष्ट्रिकांनाच राजा म्हणून अभिषेक करून घेण्याची पात्रता असे आणि त्यांनाच अभिषिक्त राजे असे संबोधीत. शौरसेनी ही या राष्ट्रिकांची बोली होती. या लोकांनी आपली वसाहत दक्षिणेत बेळगावाकडे, सोलापुराकडे, स्थूलमानाने बीडपासून सौंदत्तीपर्यंतच्या टापूत केली.
वैराष्ट्रिकांचा मूळ प्रदेश उत्तर कुरू आणि उत्तर मद्र यांच्यामध्ये असणारा विराट् या नावाचा देश. पुण्याच्या दक्षिणेकडे हे वैराष्ट्रिक स्थायिक झाले. वैराष्ट्रिकांची मूळ भाषा अपभ्रंश व या भाषेसह ते खाली उतरल
दक्षिणेकडील वसाहतींमध्ये काळाच्या दृष्टीनं दोन स्थूल भाग पडतात. पहिला पाणिनिपूर्व वसाहती व दुसरा पाणिन्युत्तर वसाहती. पहिल्या अनार्यांच्या व दुसर्‍या आर्यांच्या. सर्व अनार्य लोकांत नाग लोकांची संस्कृती उच्च समजली जात असे, व म्हणून त्यांना अनार्य म्हणणं काही संशोधकांना मान्य नाही. उत्तरेकडेसुद्धा त्यांचा आणि आर्यांचा संबंध फार आला. कुश, अर्जुन, भीम या आर्यांचे आणि नागांचे शरीरसंबंध झाले. नागांचा एक कर्कोटक नावाचा वंशज काश्मीरात राज्य करत होता. काश्मीरचा पहिला राजा असलेला नील जातीनं नाग होता असा राजतरंगिणीत उल्लेख आहे. महाभारत व इतर काही पुराणांत नागांचा उल्लेख अनेकवेळा आला आहे. बुद्धाच्या काळात नाग लोक बरेच पुढारलेले होते, कारण गौतमबुद्धानं आपल्या मताचा प्रसार या नाग लोकांमध्येच केला असल्याचं काही भित्तिचित्रांवरून स्पष्ट होतं. गौतमबुद्ध मध्ये बसलेला आणि त्याच्या भोवती कमरेवर नागाचं वेटोळं आणि डोक्यावर नागाची फणी घेतलेले असे नाग लोक बसलेले, असा देखावा या चित्रांमध्ये आहे. हे नाग लोक फार पूर्वी उत्तरेतून दक्षिणेत स्थायिक झाले होते. पाताळ हे त्यांचं वसतिस्थान असा उल्लेख म्हणूनच अनेक ग्रंथांत सापडतो. पाणिनीपूर्व काळात आर्यांच्या आधी नाग लोकांचा प्रवेश दक्षिणेत झाला. नागांचा आणि दक्षिणेकडील प्रांतांचा व विशेषत: पश्चिमेकडील कोकणाचा जास्त संबंध आला. याशिवाय गोंड, भिल्ल, वारली, कोळी, वध्र, मल्ल, काथोडी, कातकरी या एतद्देशीय लोकांच्या वसाहतीही महाराष्ट्रात होत्या.
पाणिनीपूर्व काळात आर्यांची वसाहत विंध्याच्या खाली नव्हती. कारण पाणिनीच्या अष्टाध्यायीमध्ये दक्षिणेकडील कोणत्याही देशाचा उल्लेख नाही. मात्र कात्यायनाच्या वार्तिकांमध्ये व पातंजलीच्या महाभाष्यामध्ये दक्षिणेकडील राज्यांचे स्पष्ट उल्लेख आहेत. कात्यायन व पाणिनी या दोघांमध्ये तीनशे वर्षांचा काळ होता. पाणिमीचा काळ ख्रिस्तपूर्व ७०० आहे. म्हणजे आर्यांचा दक्षिणेशी संबंध त्यानंतरचा आहे.
पाणिनीनंतरच्या काळात आर्य व त्यांच्यावर उपजीविका करणारे काही अनार्य महाराष्ट्रात आले. उत्तर भारतातील राजांच्या जुलमांना कंटाळून, धार्मिक कर्मकांडांवर आलेल्या बंधनांमुळे आणि जैन व बौद्ध धर्माच्या वाढत्या प्रसारामुळे अनेक ब्राह्मणांनी देशांतर केलं. सारस्वत ब्राह्मण पश्चिमेकडील अपरान्ताच्या मार्गानं खाली उतरले तर नंबुद्री ब्राह्मण पूर्वेकडील कलिंगाच्या मार्गानं खाली उतरले. त्याच वेळी काही ब्राह्मण विदर्भात स्थायिक ज़ाले. त्यांच्यापैकी काही खाली खानदेश, नगर व नाशिक प्रांतात उतरले. खानदेश, विदर्भ या प्रांतातेल यजुर्वेदीयांची वसती जुनी असावी. नाशिक, जुन्नर, कान्हेरी येथील शिलालेखांत हे उल्लेख सापडतात.
ब्राह्मणांप्रमाणेच आर्यांपैकी क्षत्रिय, वैश्य, शूद्र व इतर घटकही दक्षिणेकडे महाराष्ट्रात आले असावे. उत्तरेकडील महापद्मादि दुष्ट शूद्र राजांच्या, जैन-बौद्धादि पाखंडांच्या व व्रात्यशूद्रादि उत्पथांच्या जुलुमाला कंटाळून स्वधर्म, स्वराज्य व स्वातंत्र्य यांचा अनुभव घेण्यास दक्षिणारण्यात बौद्धकालाच्या प्रथम ज्वानीत म्हणजे शकपूर्व सहाशेच्या सुमारास वसाहती करण्यास आर्य शिरले, असं इतिहासाचार्य राजवाडे यांनी लिहून ठेवलं आहे. मगधातून जे लोक आले ते महाराष्ट्रीय होत. या महाराष्ट्रीय शब्दाचाच अपभ्रंश महरट्ट असा होतो. महाराष्ट्रिक आणि महाराजिक हे एकच. यांचा उल्लेख महाराजाष्टन् या पाणिनीच्या सूत्रांत आला आहे. हे क्षत्रिय होते. यांची व पुढे उल्लेखलेल्या राष्ट्रिक व वैराष्ट्रिकांची गणराज्ये होती. त्यांत गणनायक असत. अशा तर्‍हेचा एक गणनायक नाणेघाटातल्या कोरीव लेण्यांत खोदला असून त्याखाली महारठीगनकयिरो (महाराष्ट्रीगणकवीर:) असा निर्देश आहे. यांची भाषा मागधी व महाराष्ट्री होती.
 
क्षत्रियांपैकी दक्षिणेत राष्ट्रिकही आले. अशोकाच्या शिलालेखात (इ. पू. ३२७) जे रास्टिक म्हणून उल्लेखलेले आहेत ते हे राष्ट्रिक. यांचा मूळ देश कुरुपांचल. राष्ट्रिकांनाच राजा म्हणून अभिषेक करून घेण्याची पात्रता असे आणि त्यांनाच अभिषिक्त राजे असे संबोधीत. शौरसेनी ही या राष्ट्रिकांची बोली होती. या लोकांनी आपली वसाहत दक्षिणेत बेळगावाकडे, सोलापुराकडे, स्थूलमानाने बीडपासून सौंदत्तीपर्यंतच्या टापूत केली.
वैराष्ट्रिकांचा मूळ प्रदेश उत्तर कुरू आणि उत्तर मद्र यांच्यामध्ये असणारा विराट् या नावाचा देश. पुण्याच्या दक्षिणेकडे हे वैराष्ट्रिक स्थायिक झाले. वैराष्ट्रिकांची मूळ भाषा अपभ्रंश व या भाषेसह ते खाली उतरल
                                                                                             महाभारतात देशांच्या नावांची जी एक यादी दिली आहे, त्या यादीत विदर्भानंतर रूपजीविक व अश्मक ही दोन राष्ट्रं दिली आहेत. महाराष्ट्राच्या आसपासचे रूपजीविक हे लोक कोण असावेत, याबाबत नक्की सांगता येत नाही. अश्मक हे आधुनिक मराठ्यांचे पूर्वसंबंधी आहेत. त्यासंबंधीचा पुरावा आपल्याला बौद्धग्रंथांत मिळतो. बुद्धाच्या वेळी प्रसिद्ध असलेल्या ज्या सोळा जमातींची यादी बौद्धग्रंथांत दिली आहे, त्यात अश्मक हे नावही आहे. त्या वेळी अश्मक गोदावरीच्या वरच्या भागाच्या काठी राहत असत, असा उल्लेख आहे. अश्मकांची राजधानी पैठण होती. 

याशिवाय भोज, महाभोज, सत्तीयपुत्त, पेत्तोनिक, केरळपुत्त, पाण्डय, चोल इत्यादी दक्षिणेकडील लोकांचा उल्लेख अशोकाच्या शिलालेखात आला आहे. भोज हे मुळचे मथुरेचे. भोसले हे आडनाव भोज या शब्दावरूनच आलं आहे. मथुरेजवळच सात्वत नावाचे लोक राहत. सत्तीयपुत्त म्हणजे सात्वतपुत्र. सात्यकी हा सात्वत कुळातच जन्मला. यादवांचा आणि सात्वतांचा संबंध होता. पेत्तेनिक म्हणजे प्रतिष्ठानचे, अर्थात पैठणकडील लोक. पाण्ड्य हे दक्षिणेकडील. त्यांचा उल्लेख कात्यायन आपल्या वार्तिकांत करतो. 

वैश्यांपैकी दक्षिणेत वसाहत करण्यास जे आले त्यांच्यामध्ये मुख्य आभीर होते. आभीर मूळचे उत्तरेकडचे. ते सिंधुनदीच्या काठी राहत असत, असा महाभारतात उल्लेख आहे. त्यांचा आणि तत्कालीन आर्यांचा फारसा सलोखा नसावा. त्यांच्याकडे ते शत्रुत्वाचा नजरेनं पाहत असत. सरस्वती नदी जी एकदम अदृश्य झाली ती या आभीर लोकांच्या दुष्टपणामुळेच, परंतु त्यांचा मूळचा युद्धप्रिय असा स्वभाव असल्यानं त्यांची गणना चांगल्या योद्ध्यांमध्ये होत असे, व ते दस्यू जातीतले असूनसुद्धा त्यांचा उपयोग व्हावा म्हणून आर्य त्यांना आपल्या सैन्यात सामील करून घेण्यास उत्सुक असत, असं महाभारतात सांगितलं आहे. द्रोणाचार्यांनी जो सुवर्णव्यूह रचला त्यात या आभीर जातीच्या दस्यूंना त्यांनी प्रमुख स्थान दिलं होतं. दुसर्‍या एका आभीरांच्या टोळीनं अर्जुन द्वारकेहून श्रीकृष्णाच्या विधवापत्नींबरोबर परत येत असताना त्यांच्यावर हल्ला केल्याचं महाभारतात लिहिलं आहे. अभीरांना लुटारू, गवळी, गुराखी, म्लेंच्छ इत्यादी नावांनी महाभारतात संबोधलं आहे. बाप ब्राह्मण आणि आई अम्बष्ठ यांपासून झालेल्या संततीस मनुस्मृतीत आभीर असं संबोधलं आहे.

यावरून असं लक्षात येतं की, आभीर कोणीतरी कडवे, लढवय्ये, सतत फिरणारे असे लोक असावेत. आणि इतर शक, ग्रीक, यूएची, कांबोज इत्यादी जातींचे लोक जसे हिंदुस्थानात उतरले, तसे त्यांच्याबरोबर हेही उतरले असावेत, व त्यानंतर पंजाबात त्यांनी सिंधू नदीच्या काठी वस्ती केली असावी. हे साधारण इसवी सनाच्या सुरुवातीला घडलं असावं. दुसर्‍या व तिसर्‍या शतकांतील शिलालेखांत आभीरांसंबंधी उल्लेख सापडतात. इ. स. १८१मधील क्षत्रप राजा रुद्रसिंह याच्या लेखात रुद्रभूति नावाच्या त्याच्या आभीर सेनापतीचा उल्लेख आहे. शिवदत्ताचा मुलगा ईश्वरसेन हा आभीर होता अशी माहिती इ. स. ३००च्या नाशिकच्या लेण्यांतल्या शिलालेखात मिळते. इ. स. ३६०मध्ये समुद्रगुप्ताने अलाहाबाद इथे एका स्तंभावर एक लेख कोरवला होता. गुप्त साम्राज्याच्या मर्यादेपलीकडे दक्षिणेस आणि नैऋर्त्येस राजस्थान आणि माळवा प्रांतांत मालव आणि आभीर या दोन जाती नांदतात असं या लेखात म्हटलं होतं. पंजाबात सिंधू नदीच्या काठी इसवी सनाच्या सुरुवातीला आभीर लोक राहत होते, असं मानलं तर त्यांना माळव्यात पोहोचायला तीनशे वर्षं लागली. यांपैकी काही लोकांनी तिथेच स्थायिक होण्याचं ठरवलं असावं, हे नाशिकच्या शिलालेखावरून स्पष्ट होतं. झांशीच्या दक्षिणेस अहिरवाड आणि अहारवाड अशी जी दोन गावं आहेत, ती संस्कृतातील आभीरवाटिका या शब्दावरून आली आहेत. काही टोळ्यांनी इथे राज्यं स्थापन केली असावीत, आणि काही टोळ्या पुन्हा दक्षिणेस आणि पश्चिमेस गेल्या असाव्यात. कारण आठव्या शतकात ज्या वेळेस सौराष्ट्रावर हल्ला झाला त्या वेळी तो प्रांत आभीरांच्या ताब्यात होता, असं एन्थोव्हेन आपल्या Castes and Tribes in Bombay Presidency या पुस्तकात म्हणतो. हेच आभीर लोक दक्षिणेकडे आल्याचा पुरावाही तो देतो. खानदेशातील असीरगड हा अस-अहीर या आभीर जातीतल्या पुरुषानं बांधल्याचं फेरिस्ता आपल्या इतिहासात लिहितो. दक्षिणेत सहाव्या सातव्या शतकापर्यंत आंध्रभृत्य राजे राज्य करत होते. त्यांच्या राजवटीनंतर आभीरांची राजवट महाराष्ट्रात सुरू झाली, असा उल्लेख काही पुराणांत सापडतो.

पुराणांमध्ये आभीर राजे म्हणून ज्यांचा उल्लेख येतो, त्यांच्यापैकीच एक शाखा त्रैकुटकांची असावी. इ. स २५०च्या सुमारास क्षत्रप कुलानंतर त्यांचा उदय झाला. अणि हैहय या नामाभिधानानं त्यांनी आपलं राज्य स्थापन करून त्रिकुट या शहरास आपली राजधानी केली. हे घडलं इ. स. ४५५-४५६मध्ये. उत्तर महाराष्ट्र आणि दक्षिण गुजरातेत त्यांनी आपला अंमल पुढे सुमारे शंभर वर्षं, चालुक्यांकडून त्यांना बाधा येईपर्यंत निर्वेध चालवला. त्रिकुट म्हणजे पुण्याजवळचं जुन्नर. अशा प्रकारे महाराष्ट्रातलं वसाहतकर्म इ. स. ६००मध्ये पूर्ण झालं. 

वसाहत कायम, स्थिर झाली म्हणजे साहजिकच राजदंडाची आवश्यकता निर्माण होते. महाराष्ट्रावर पहिली सत्ता मौर्यांची होती. याबद्दल ठोस असा पुरावा शिलालेखांतून मिळतो. सम्राट अशोकाने आपल्या स्वभावात नैतिक परिवर्तन झाल्याचे लेख आपल्या साम्राज्याच्या चारही टोकांवर प्रजेचे मन हिंसेपासून वळवण्यासाठी त्या त्या प्रांताच्या बोलींत खोदवले होते. या लेखांपैकी एक ठाणे जिल्ह्यात सोपारा इथे, दुसरा महाराष्ट्राच्या पूर्व सरहद्दीवर जबलपुराकडे रुपनाथ इथे, तिसरा आग्नेयीच्या कोपर्‍यात मस्की इथे आणि चौथा महाराष्ट्राच्या दक्षिण टोकास सिद्धापूर इथे, असे महाराष्ट्राच्या चार सीमांतांवर खोदवले आहेत. यावरून हा प्रांत अशोकाच्या साम्राज्यात येत असावा. अशोकानंतरच्या बिंदुसार राजाने जरी आक्रमण केलं नाही तरी पुढच्या चंद्रगुप्त मौर्याची सत्ता महाराष्ट्रावर होती. मौर्यसत्तेचा व मौर्य घराण्याचा स्मृत्यवशेष मोरे या आडनावात राहिला आहे. मौर्यांची सत्ता ख्रिस्तपूर्व ३२१पासून १८४पर्यंत होती.
satavahana.jpg
सातवाहनांच्या आधिपत्याखाली असलेला प्रदेश
मौर्यांच्यानंतर ख्रिस्तपूर्व एक दोन शतकांपासून ख्रिस्तोत्तर दोन शतकांपर्यंत सातवाहन अथवा आंध्रभृत्य या राजांचा अंमल महाराष्ट्रावर होता. हे घराणे सनातनी होते की अन्यधर्मीय परके होते यासंबंधी मतभेद आहेत. इतिहासाचार्य राजवाडे त्यांना हिंदुधर्माचे कट्टर पुरस्कर्ते मानतात. ते अळूची भाजी व भात खाणारे, त्यांच्या रथाच्या बैलांचे कान फाडलेले आणि आंध्र राजांचे सेवक म्हणवणारे असे होते, अशा अर्थाची काही अनुमाने राजवाडे यांनी सातवाहनांसंबंधी राधामाधवविलासचंपूच्या प्रस्तावनेत काढली आहेत. महाराष्ट्रावर राज्य करणारे महाराष्ट्रीय घराणे हे पहिलेच, हे नक्की. राजसत्तेसाठी या घराण्यात व खड्गाराट घराण्यात बर्‍याच चकमकी झाल्या. नहपाण खड्गाराटाने सातवाहनांचा पराभव केल्याचा उल्लेख नाशिक व कार्ले इथल्या शिलालेखांत आहे. परंतु पुढे लगेच सातवाहन गौतमीपुत्र आणि पुलयामी या दोघांनी खड्गाराटाचा पराभव करून आपला प्रदेश पुन्हा काबीज केला. काही काळाने गौतमीपुत्राचा पराभव माळव्याच्या रुद्रदामन् या क्षत्रप राजाने केला व अशा रीतीने सातवाहनांची राजवट संपली.
सातवाहनांनंतर महाराष्ट्राच्या पश्चिम भागावर त्रैकूटक नावाचे राजे ख्रिस्तोत्तर तिसर्‍या शतकाच्या मध्यापासूनच राज्य करत असल्याचा दाखला कान्हेरी येथील शिलालेखांवरून मिळतो. या राजांची सत्ता आपल्या नावाचा राजशक सुरू करण्याइतकी मजबूत झाली होती. त्रैकुटकांचा शक इ. स. २४९पासून सुरू होतो.
त्रैकुटकांनंतर महाराष्ट्रावर सार्वभौमत्व वाकाटक राजांनी गाजवले. यांच्या साम्राज्यात सर्व महाराष्ट्र व शिवाय उत्तरेकडील काही प्रांत येत असे. यांच्याच राजवटीत उत्तरेकडील सम्राट समुद्रगुप्ताने दक्षिणेत स्वारी केली. कालिदासाने आपल्या रघुवंशात रघूने केलेल्या स्वारीचे वर्णन या समुद्रगुप्ताच्या स्वारीचेच आहे की काय, अशी विद्वानांना शंका आहे. समुद्रगुप्ताच्या या स्वारीचं वर्णन एका शिलालेखात आहे. त्यात एरंडपल्लीचा दमन आणि देवराष्ट्राचा कुबेर या दोन राजांचा त्याने पराभव केल्याचा उल्लेख आहे. एरंडपल्ली म्हणजे खानदेशातील एरंडोल व देवराष्ट्र म्हणजे सातारा जिल्ह्यातील (तासगाव तालुका) देवराष्ट्र ही गावे होत. देवराष्ट्राजवळच जे शंकराचं स्थान आहे, त्याला सागरेश्वर अथवा समुद्रेश्वर असं म्हणतात. यावरून समुद्रगुप्ताच्या नावाचा याच्याशी संबंध असावा. काही विद्वानांच्या मते एरंडपल्ली व देवराष्ट्र ही दोन्ही स्थळं महाराष्ट्रात नसून तामिळनाडूत आहेत.
chalukya_0.jpg
चालुक्यांच्या आधिपत्याखाली असलेला प्रदेश
वाकाटकांनंतर कलचूरी घराण्याचा महाराष्ट्राशी संबंध आला. या घराण्याने त्रैकूटकांचा राजशक सुरू केला होता. त्यावरून कदाचित हे घराणे त्यांच्यापैकीच असावं, असं वाटतं. कलचूरींचा पराभव मंगलीश नावाच्या चालुक्याने करून चालुक्यांची सत्ता जी महाराष्ट्रात स्थापन केली ती निर्वेधपणे इ. स. ७५३पर्यंत मोठ्या भरभराटीने चालली. चालुक्यांचा अंमल ९९,००० गावांवर व महाराष्ट्राच्या तीन विभागांवर होता, अशा मजकुराचा एक शिलालेख आहे.
rashtrakuta.jpg
राष्ट्रकुटांच्या आधिपत्याखाली असलेला प्रदेश
मध्ये काही काळ चालुक्यांवर गंडांतर येऊन त्यांना राष्ट्रकूटांकडून पराजय पत्करावा लागला होता. राष्ट्रकूट घराण्यांपैकी एकोणीस राजांनी इ. स. ७५३पासून ९७४पर्यंत मराठवाड्यात असलेल्या मान्यखेट (मालखेड) इथे अविच्छिन्न सत्ता गाजवली. या वंशातील दुसरा कर्क या राजाचा चालुक्यवंशीय तैलप नावाच्या राजानं पराभव करून आपली गमावलेली सत्ता पुन्हा दीडशे - सव्वादोनशे वर्षांनंतर मिळवली. चालुक्यांच्या मोठ्या साम्राज्यात काही मांडलिक राजे होते. या मांडलिकांपैकी सेउणदेशीय मांडलिक आणि माळव्याचा भोज यांच्यात चकमकी झाल्या. शेवटी सेउणचंद्राने चालुक्यसत्ता कायम केली. चालुक्यांचा अंमल इ. स. ११८९पर्यंत निर्वेध चालला. पुढे शेवटचा सोमेश्वर मरण पावल्यावर त्याचे मांडलिक आपआपसांत भांडून आपल्या जागीच प्रबळ झाले व मध्यवर्ती चालुक्यसत्तेचा नाश झाला.
चालुक्यांनंतर यादवांची राजवट सुरू झाली. यांचा मुख्य प्रस्थापक भिल्लम नावाचा राजा होता. यादव घराण्याच्या शाखा दोन. एक दक्षिणेकडील द्वारसमुद्राची शाखा आणि दुसरी उत्तरेकडील देवगड-देवगिरीची शाखा. या दोन्ही शाखा आपआपसांत भांडत असत. शेवटी भांडणात देवगिरीचा सिंधण राजा विजयी झाला व त्याच्याच वंशाने पुढे चौदाव्या शतकाच्या आरंभापर्यंत राज्य केलं. इ. स. ११८९पासून ते १३१२पर्यंतच्या काळात यादवांच्या कुळात एकंदर सात राजे झाले. मराठा धर्म, मराठी भाषा, मराठी वाङ्मय यांच्या दृष्टीनं यादवांची राजवट ही उल्लेखनीय आहे. यादवांच्या राजवटीत मराठी भाषा व वाङ्मय यांचा आरंभ व परिपोष झपाट्याने झाला. यादवांचं राज्य सुरळीत चालयामुळे संत, संन्यासी, कवी अव्वल दर्जाचं काव्य निर्माण करू शकले. कृष्ण, महादेव व रामदेव या राजांच्या काळात प्रजेला भरपूर संपन्नता लाभली. पण दुर्दैवानं महमदीयांची नजर दक्षिणेकडे वळली व अल्लाउद्दिनाच्या नेतृत्वाखाली त्यांच्या झुंडी येऊन यादवांची राजवट लयाला गेली. शेवटी मलीक काफ़ूराने शंकरदेव यादव याला ठार मारून यादव सत्तेचा अंत केला.
महाराष्ट्रातील वसाहतीचा व राजसत्तेचा हा इतिहास. उत्तरेकडून दक्षिणेत जे लोक आले ते वेगवेगळ्या प्रांतांतून आले आणि येताना आपल्या भाषा घेऊन आले. अर्धमागधी, शौरसेनी, महाराष्ट्री, मागधी वगैरे भाषा अशा प्रकारे महाराष्ट्रात आल्या. या सर्व भाषांच्या खुणा आज मराठीत सापडतात. पण मराठीची उत्पत्ती झाली कशी?
kalpesh1.JPG
अगदी जुन्या भाषा कशा उत्पन्न झाल्या, हा तसा वादग्रस्त व अनेक दृष्टींनी अनिश्चित असा विषय आहे. संस्कृत, फारसी, लॅटीन या भाषा कशा निर्माण झाल्या, किंवा द्राविड भाषा किंवा चिनी भाषा कशा उत्पन्न झाल्या, हा विषय आपण सोडून देऊ. पण अलीकडच्या काळात एक भाषा नष्ट होऊन नवी भाषा कशी व का उत्पन्न होते, हा एक अत्यंत महत्त्वाचा प्रश्न आहे. ज्ञानेश्वरीपासून आतापर्यंत मराठी भाषेच्या स्वरूपात काळानुसार थोडा फरक होत गेला आहे. परंतु भाषा एक असून तिला आपण मराठी असंच म्हणतो. ही मराठी भाषा ज्ञानेश्वरांपूर्वी उत्पन्न झाली आणि पूर्वी इथे प्रचलित असलेली महाराष्ट्री भाषा मृत झाली. मराठी भाषा कशी उत्पन्न झाली याचा विचार करत असताना ती तशी का उत्पन्न झाली, हा विचारही करावा लागतो. मूळात नवीन भाषा तयार का होतात?
कोणत्याही भाषेला तिचे बोलीचे स्वरूप जाऊन साहित्यिक स्वरूप प्राप्त झालं म्हणजे ती स्वत: नाहिशी होऊन इतर भाषांचा जन्म होतो, असा सिद्धांत काही भाषातज्ज्ञ मांडतात व त्याला आधार आर्यभाषांचा देतात. वैदिक संस्कृतापासून ज्या वेळी साहित्यिक भाषा तयार झाली त्या वेळी प्राकृत भाषा निर्माण झाल्या व बोली म्हणून त्यांनी आपलं वर्चस्व गाजवण्यास सुरूवात केली. या प्राकृत भाषा ज्या वेळी साहित्यिक भाषा म्हणून साच्यांत जाऊन बसल्या त्या वेळी बोली म्हणून त्यांनी गाजवलेले वर्चस्व अपभ्रंश भाषेने आपल्याकडे घेतलं. पुढे काळाच्या ओघात या अपभ्रंश भाषेनं साहित्यिक भा्षेचं स्थान मिळवलं आणि सिंधी, हिंदी, गुजराती, मराठी या बोली म्हणून उदयास आल्या, असा एक सिद्धांत आहे. परंतु हा सिद्धांत फारसा पटत नाही. एखाद्या भाषेच्या उद्भवास तिच्या पूर्वभाषेचं साहित्यिक स्वरूप जर कारणीभूत असेल, तर हिंदी, गुजराती, बंगाली, मराठी या आधुनिक भाषांना सध्या साहित्यिक स्वरूप प्राप्त झाल्यानं त्या मरून त्यांच्यापासून नवीन भाषांनी जन्म घ्यायला हवा होता. परंतु तसं झालेलं दिसत नाही. मराठी भाषा तर गेली अनेक शतकं साहित्यिक भाषा म्हणून टिकून आहे आणि असं असूनही तिचा विकासच होतो आहे. कोणतीही भाषा साहित्यिक होणं हे तिच्या उत्कर्षाचं गमक आहे, तिच्या अवनतीचं नव्हे आणि तिच्या नाशाच तर नव्हेच नव्हे. उलट साहित्यिक भाषेचं कायमचं न बदलणारं स्वरूपच तिच्यापासून दुसरी भाषा उत्पन्न होण्यास विरोध करतं. बोली जशी परिवर्तनशील असते तशी साहित्यिक भाषा असत नाही. परिवर्तनशील बोलीपासूनच दुसरी भाषा निर्माण होणं अधिक शक्य आहे. तेव्हा नवीन भाषा तयार होण्याचं कारण भाषेचं साहित्यिक स्वरूप नसून दुसरं काही असलं पाहिजे. समाजाला धक्का बसल्याखेरीज कोणतीही भाषा बदलत नाही. लोकक्रांती, राज्यक्रांती, धर्मक्रांती वगैरेंसारखा जबर धक्का समाजाला बसल्याखेरीज भाषा बदलत नाही. आर्यभाषेच्या स्वरूपांत निरनिराळी अवस्थांतरं ज्या ज्या काळांत झाली त्या त्या काळांत अशा तर्‍हेची क्रांती झाल्याचं इतिहासावरून दिसतं. मराठीच्या उत्पत्तीच्या बाबतीत अशा प्रकारची झालेली क्रांती सांगण्यापूर्वी तिची उत्पत्ती कशी झाली, हे बघणं आवश्यक आहे.
कोणत्याही भाषेचं स्वरूप अभ्यासताना तिच्या अंतरंगाचा विचार करावा लागतो. बाह्य स्वरूपात फक्त शब्दांचाच संबंध येत असल्यामुळे त्यांचा विचार बाजूला ठेवून वर्णप्रक्रिया, प्रत्ययप्रक्रिया, प्रयोगप्रक्रिया इत्यादी गोष्टी काळजीपूर्वक तपासाव्या लागतात. पूर्ववैदिक, वैदिक, संस्कृत, प्राकृत, अपभ्रंश इत्यादी भाषांच्या स्वरूपावरून जर सहज नजर फ़िरवली तर त्या प्रत्येकीच्या स्वरूपातले काही घटक मराठीत आल्याचं कळून येतं व अशाप्रकारे पूर्वीच्या निरनिराळ्या भाषांची बरीच साम्यं मराठीत आढळून येतात, आणि म्हणूनच मराठीच्या उद्गमाविषयी विद्वानांमध्ये मतभेद झालेला दिसतो. पूर्ववैदिक, पाली, अर्धमागधी, संस्कृत, अपभ्रंश, माहाराष्ट्री या सार्‍या भाषांना मराठीचं जनकत्व बहाल केलं जातं. मराठीच्या उद्गमाविषयी अशा प्रकारचं मतवैचित्र्य आहे. या प्राचीन भाषांचे अवशेष मराठीत सापडतात, हे यामागचं कारण.

 एक मत असं आहे की, वेदसमकालीन ज्या बोली होत्या त्यांपासून मराठी निर्माण झाली, व याला आधार म्हणजे वेदांमध्ये संस्कृत भाषेच्या स्वभावाशी विसंगत व प्राकृत भाषांच्या स्वभावाशी जुळणारे जे विशेष सापडतात ते होत. वैदिक संस्कृतातले काही शब्द मराठीत, विशेषत: ग्रामीण मराठीत आजही वापरले जातात. उदाहरणार्थ, त्यो हे सर्वनाम. संस्कृतात या शब्दनामाचा छडा लागत नाही. पण मराठीत मात्र हा शब्द अजूनही ऐकू येतो. परंतु या तुटपुंज्या पुराव्यावर मराठी भाषा त्या भाषांपासून निर्माण झाली असं म्हणता येणार नाही. शिवाय भाषेला शिष्ट व अशिष्ट, किंवा नागर व ग्रामीण किंवा ग्रांथिक व बोली अशी रूपं असतात. त्यांपैकी वेदकालीन भाषेतही अशी रूपं असतीलच. त्यामुळे तत्कालीन बोलीतील काही अवशेष आज मराठीत सापडतही असतील. परंतु त्यावरून मराठीचं जनकत्व वेदकालीन बोलींना आपण बहाल करू शकत नाही.
दुसरा एक पक्ष मराठीची जननी संस्कृत भाषा ही आहे, असं मानतो. फक्त वरवर जरी पाहिलं तरी संस्कृत ही मराठीची जननी ठरत नाही. वर्णाचे बदल, प्रयोगाची भिन्नता, उच्चारांत फरक स्पष्ट आहेत. मराठी आणि संस्कृत या दोन्हींत नातं आहेच. या दोन्ही भाषांत पुष्कळ अंतर्वर्ती अशा अवस्था या प्राकृत भाषा आहेत. भाषेच्या एकंदर वाढीच्या दृष्टीनं अशा अवस्था उत्पन्न होणं अपरिहार्य आहे. तेव्हा संस्कृत भाषेला मराठीची जननी म्हणणं अशास्त्रीय ठरतं. हाच युक्तिवाद प्राकृत भाषांबद्दलही करता येईल.
पाली, मागधी, अर्धमागधी, माहाराष्ट्री, अपभ्रंश इत्यादी प्राकृत भाषांपासून मराठीचा उद्भव झाला, असं जेव्हा तज्ज्ञ म्हणतात तेव्हा पुरावे म्हणून या भाषांचे आज मराठीत अस्तित्वात असलेले अवशेष पुढे केले जातात. मात्र कोणत्याही एका प्राकृत भाषेतून मराठीचा जन्म झाला, असं ठामपणे म्हणता येणार नाही. प्राकृतोद्भव व प्राकृतिकोद्भव म्हणून ज्या काही आधुनिक, वर्तमानकालीन बोली आहेत, त्यांपैकी सिंधी, गुजराती, हिंदी किंवा बंगाली यांसारख्या बोली व मराठी यांत फरक आहे. शौरसेनीपासून हिंदी, अपभ्रंशापासून सिंधी व गुजराती, मागधीपासून बंगाली अशा या भाषांचा उद्भव मध्ययुगीन प्राकृत भाषांपासून झाला, असं म्हणता येतं. अमक्या एका भाषेपासून दुसरी भाषा तयार झाली असं म्हणताना जी भाषा उत्पन्न झाली तिने मूळ भाषेच्या व्याकरणाचा सर्वच्या सर्व सांगाडा उचलला, हे सिद्ध करावं लागतं. बंगालीने मागधीचं सर्व व्याकरणतंत्र जसंच्या तसं उचललं आहे. त्याचप्रमाणे शौरसेनीचं व्याकरणतंत्र हिंदीनं उचललं आहे. तोच प्रकार सिंधी, गुजराती आणि अपभ्रंश-आभीरांच्या भाषांचा आहे. परंतु मराठी भाषेनं संपूर्ण सांगाडा माहाराष्ट्रीपासून किंवा अपभ्रंशापासून तंतोतंत घेतला, असं दाखवता येत नाही. मराठी भाषेत बराचसा भाग हा अपभ्रंश व माहाराष्ट्रीपासून आलेला आहे. मराठीतील नामविभक्तींचा भाग हा अपभ्रंश भाषेपासून आलेला आहे, तर आख्यातविभक्तींचा भाग, म्हणजे क्रियापदांचे प्रत्यय वगैरे, माहाराष्ट्रीपासून घेतलेला दिसतो. मात्र याचबरोबर आधी म्हटल्याप्रमाणे इतर काही प्राकृत भाषांच्या लकबी मराठीत सामावलेल्या दिसून येतात.
प्राकृत भाषांपैकी आद्य असलेल्या पाली भाषेचे काही अवशेष मराठीत सापडतात. काही शब्दांची वर्णप्रक्रियेमुळे झालेली रूपांतरं पालीमध्ये जी आढळतात, तीच मराठीत आलेली आहेत. तिण (तृण), पाऊस (प्रावृष्), पिळणे (पीडनं), छकडा (शकट), गूळ (गुड), अस्वल (ऋच्छमल्ल) इत्यादी पाली भाषेचा स्पष्ट शिक्का असलेले शब्द मराठीत रूढ आहेत. दुसरी गोष्ट पाली भातील 'ळ'कारासंबंधी. पाली भाषेत 'ळ'कार ही एक विशेष बाब आहे. 'ळ' हा वर्ण पाली-पैशाचीखेरीज इतर प्राकृत भाषांमध्ये नाही. 'ळ'कार संस्कृत भाषेत नाही, पण वैदिक भाषेत आहे. तिथूनच तो पाली भाषेत आला असावा. 'ळ'कार हा मूर्धन्य वर्ण असल्यानं इतर मूर्धन्य वर्ण जसे द्राविडी भाषेच्या संपर्कानं आर्यभाषेत शिरले, तसा 'ळ' हा वर्णही त्यांच्या बरोबर द्राविडी भाषेतून शिरला असावा. शिष्ट मराठी भाषेत या 'ळ'काराच्या उच्चाराचं तसं बरंच स्तोम आहे. नळ, डाळिंब, ओंजळ, सावळा, सळई, आळे, फळे, काजळ, मिळणे इत्यादी अनेक संस्कृतोद्भव शब्दांत 'ळ'चा वापर केला जातो. जळ, कमळ, सकळ इत्यादी शब्दांत तो वैकल्पिक आहे. या शब्दांत 'ल'चा वापरही केला जातो. कित्येक शब्दांत 'ल'काराऐवजी 'ळ'कार घातल्यास अर्थ सर्वस्वी बदलतो. म्हणजे ते स्वतंत्र अर्थाचे निराळेच शब्द होतात. उदा. चूल, चूळ; बोल, बोळ; गाल, गाळ; नील, नीळ; वेल, वेळ इत्यादी. जुन्या पेशवाईकाळच्या मराठी लिखाणांत 'ल' हाच जास्त प्रचारात होता. त्या काळी 'ळ' दाखवण्यासाठी 'ल'च्या मागे एक 'त्'कार जोडत असत. 'त्ल' हे चिन्ह 'ळ'बद्दल वापरत असत.
पैशाची भाषेतील जी लकब मराठी भाषेत राहिली ती 'ण' व 'न' यासंबंधी होय. पैशाचीशिवाय इतर प्राकृत भाषांत 'ण'कार आहे, परंतु 'न'कार नाही. उलट पैशाचीत 'न'कार आहे, पण 'ण'कार मुळीच नाही. पैशाची भाषेची ही लकब मराठीतही बर्‍याच वेळी दिसून येते. उदा. ऊन (उष्ण), तहान (तृष्णा), कान (कर्ण), रान (अरण्य), जानवे (यज्ञोपवीत), विनंती (विण्णतिआ), सुने (सुण्ण) इत्यादी पुष्कळ शब्दांत संस्कृतातील अथवा प्राकृतांतील 'ण'काराऐवजी 'न'कारच मराठीत वापरला गेला आहे.
मागधी या प्राकृत भाषेनंही मराठीत आपल्या खुणा ठेवल्या आहेत. मागधी भाषेचा एक विशेष असा की, 'र'कार व 'स'कार या दोहोंबद्दल 'ल'कार व 'श'कार हे अनुक्रमे येतात. तसंच संस्कृत 'स्थ' अगर 'र्थ' या जोडवर्णाबद्दल मागधीत 'त्थ' येतो. तसंच 'ष्ट'चा 'स्ट' होतो. यांपैकी बरेच प्रकार ग्रामीण मराठीत रूढ आहेतच, परंतु शहरी मराठीतही हे प्रयोग आढळतात. उदा. ओशाळणे (अपसर), मिसळ (मिश्र), घोळतो (घूर्णते), जोशी (जोइसी), केशर (केसर), पेलणे (प्रेरनम्).
अर्धमागधीचे बरेच विशेष मराठीत आढळून येतात. अर्धमागधी आणि माहाराष्ट्री या दोन्ही भाषा पुष्कळ अंशी सारख्या स्वरूपाच्या असल्यानं अर्धमागधीचे जे विशेष मराठीत आढळतात ते माहाराष्ट्रीच्या विशेषांशीही जुळतात. जो प्रांत मराठीनं सध्या व्यापला आहे, त्यात जैनधर्मीयांनी आपल्या धर्माच्या प्रसारासाठी बराच प्रयत्न केला. जैनधर्मीयांची धर्मभाषा अर्धमागधी असल्यानं मराठीच्या स्वरूपावर अर्धमागधीचाही प्रभाव जाणवतो. दीर्घ स्वर र्‍हस्व करणे, मृदु व्यंजने कठोर करणे इत्यादी लकबी अर्धमागधीतून मराठीत आल्या आहेत.
माहाराष्ट्री भाषेचं बरंच ऋण मराठीनं घेतलं आहे. अनेक शतकं ही बोली ग्रांथिक भाषा म्हणून प्रचलित होती, तेव्हा अशा शिष्टसंमत भाषेचा ठसा मराठीवर उमटणं साहजिकच आहे. अकारान्त नपुंसकलिंगी नामं जशी माहाराष्ट्रीत लिंग बदलत नाहीत तशी मराठीतही बदलत नाहीत. मराठीतला द्वितीयेचा 'स' हा प्रत्यय माहाराष्ट्रीतल्या षष्टीचतुर्थीच्या 'स्स' या प्रत्ययावरून आला आहे. उदा. हत्तीस < हत्तिस्स, आगीस < अग्गिस्स. माहाराष्ट्रीतल्या आख्यातविभक्तीतले बरेच प्रकार मराठीत जसेच्या तसे उतरले आहेत. काळ व अर्थ यांचे प्रत्यय मराठीनं माहाराष्ट्रीपासून घेतले आहेत. मराठीतल्या कर् या धातूची भविष्यकाळाची रूपं माहाराष्ट्रीतल्या रूपांवरून कशी आली आहेत, हे खालील उदाहरणांवरून कळेल.
१. करिस्सामि > करिहिमी > करिइइं > करी + ल = करीन
२. करिस्सामो > करिहिमो >करिहिमु>करिइउं > करउं > करूं + ल > करून >करू
इच्छार्थक धातुही मराठीत माहाराष्ट्रीतून आले आहेत.
'मी' या सर्वनामाच्या बाबतीत मराठीतली सर्व रूपं माहाराष्ट्रीतल्या रूपांशी जुळतात. एकवचनाची रूपं - उदा. अहम्मि, अम्मि, म्मि > मी, महाहिंतो . मजहुनि, मज्झ>मज, मेज्च्चअ > माझं.
अनेकवचनाची रूपं - उदा. अम्हे>आम्ही, अह्मसुंतो > आह्माहुनी, अह्म > आह्मां, अम्हेसुं > आम्हांत
तारतम्याचा गुण मराठीनं माहाराष्ट्रीपासून घेतला आहे. नामे व्यंजनान्त न ठेवता स्वरान्त ठेवण्याची प्रवृत्ती माहाराष्ट्री व अपभ्रंश या दोन्हींमध्ये आहे. तीच मराठीनं उचलली. विशेष्याची जी विभक्ती तीच विशेषणाची ठेवण्याची जी प्रवृत्ती संस्कृत, माहाराष्ट्री, अपभ्रंश यांमध्ये दिसते, तीच बरेचदा मराठीतही दिसते. मराठीतल्या काही शब्दांची लिंगे माहाराष्ट्री व अपभ्रंश भाषेतील लिंगांप्रमाणे आहेत. उदा. पाऊस, जन्म, सरा, नयन हे पुल्लिंगी, आणि अंजली, गाठ हे स्त्रीलिंगी.
अपभ्रंशातूनही अनेक विशेष मराठीत आले. अपभ्रंश ही आभीरांची भाषा होती. आभीर सिंध प्रांतातून कोकणात व विदर्भात येऊन स्थायिक झाले होते, व त्यामुळे अपभ्रंशाचे बरेच अवशेष मराठीत सहज सापडतात. (डॉ. गुणे व डॉ. वि. भि. कोलते यांच्या मते तर अपभ्रंशापासूनच मराठीची उत्पत्ती झाली. ) नामाला लागणारे विभक्तींचे प्रत्यय मराठीनं अपभ्रंशापासून घेतले आहेत. सर्व विभक्तीप्रत्यय अपभ्रंशोत्पन्न आहेत. भाववाचक नामं तयार करण्यासाठी अपभ्रंश भाषेत प्पण हा प्रत्यय वापरला जातो. तोच मराठीनं उचलला आहे. अपभ्रंशाप्रमाणे मराठीतही आधी नामाचं सामान्यरूप होऊन नंतर विभक्तीचे प्रत्यय लागतात. मराठी व वर्तमानातील इतर बोलींतील काव्यात अन्त्ययमकाचं प्राबल्य दिसून येतं. हे अन्त्ययमक अपभ्रंश भाषेतून आलं आहे. अपभ्रंश भाषेतलं सर्व पद्यवाङ्मय अन्त्ययमकयुक्त आहे. संस्कृत, पाली व इतर प्राकृत भाषांत हा प्रकार नाही. त्याचप्रमाणे अपभ्रंश भाषेतील छंदांचे काही प्रकारही मराठीनं घेतले आहेत.
प्राकृत भाषांप्रमाणेच संस्कृत भाषेचाही जबरदस्त प्रभाव मराठीवर पडला आहे. ऋ, ॠ, ऐ, औ हे वर्ण संस्कृतात व मराठीत आहेत, प्राकृतात नाहीत. ङ्, ञ् ही दोन अनुनासिके संस्कृतात आहेत, प्राकृतांत नाहीत. मराठीत ती संस्कृतातूनच आली आहेत. संस्कृत शब्द तर मराठीत अमाप आहेत. तद्भव शब्दांचा भरणा आहेच. परंतु तत्सम शब्दंही कमी नाहीत. प्राकृत भाषांत तत्सम शब्द नाहीत.
पूर्ववैदिक, संस्कृत, प्राकृत आणि मराठी ही अवस्थांतरं कशी झाली, हे या उदाहरणावरून स्पष्ट व्हावं.
marathi.jpg
संस्कृत बोलणार्‍या आर्यांनी जेते म्हणून वसाहत केली, त्यावेळी इथल्या मूळ रहिवाशांनी आपली भाषा सोडून जेत्यांची संस्कृत भाषा उचलण्याचा प्रयत्न केला, आणि अशा प्रकारे चार प्राकृत भाषा तयार झाल्या. या उत्पत्तीचा काळ इ. पू. ६००-७०० असा धरता येईल. पाणिनीच्या वेळी संस्कृत भाषा बोलली जात होती. बुद्धाच्या वेळी प्राकृत भाषा निर्माण झाल्या होत्या. महाराष्ट्रात माहाराष्ट्री, पूर्वेकडे मागधी, मध्यप्रदेशात शौरसेनी आणि उत्तरेत पैशाची अशा या भाषा निर्माण झाल्या. या भाषा केवळ संस्कृतातून तयार झाल्या. त्यांचा वर्णोच्चार नरम होता आणि व्याकरणही अधिक सोपं होतं. मराठी भाषेच्या पूर्वी लोकांच्या वापरात असणार्‍या प्राकृत व अपभ्रंश या भाषांचा अस्त केव्हा झाला व मराठीचा उगम कधी झाला, हे निश्चित ठरवणं तसं कठीण आहे. नवी भाषा हळूहळू लोकमान्य होत असताना जुनी भाषा काही काळापर्यंत प्रतिष्ठित ग्रंथकार व लोक लिहीत व बोलत असतात. पाली, शौरसेनी, माहाराष्ट्री वगैरे प्राकृत भाषा लोकमान्य होत असताना पाणिनीय संस्कृत भाषा प्रतिष्टित लोकांत प्रचलित होती. अपभ्रंश भाषा प्रचलित होत असताना ग्रंथकार मात्र प्राकृत भाषेत लिहीत असत, आणि आधुनिक बोलीचा जन्म झाल्यावरदेखील पुष्कळ वर्षं अपभ्रंश व प्राकृत भाषांत ग्रंथ लिहिले जात असत. अपभ्रंश भाषेत तर इ. स. १२००पर्यंत उत्तम प्रकारची व पुढे १५०० सालापर्यंत थोडी ग्रंथरचना झाली आहे. तेव्हा पूर्वी प्रचारात असलेल्या भाषांचा अंत व नवीन भाषांचा जन्म या दोन्ही गोष्टी एकाच वेळेस होणे शक्य नाही. महाराष्ट्रात मराठी जन्मास येण्यापूर्वी अमुक एक विशिष्ट प्राकृत भाषा लोकांच्या बोलण्यात होती, असं आपल्याला सांगता येत नाही. महाराष्ट्रीय समाज कोणतीही एक विशिष्ट प्राकृत भाषा बोलत नसून निरनिराळ्या प्राकृत भाषा बोलणारे निरनिराळे समाज होते व ते एकवटून त्यांच्या मिश्रणाने महाराष्ट्रीय समाज तयार झाला, व त्यांच्या भाषांच्या मिश्रणाने बनलेल्या मिश्र प्राकृतापासून मराठी भाषा बनली. शौरसेनी बोलणारे राष्ट्रिक लोक, मागधी व माहाराष्ट्री बोलणारे महाराजिक व महाराष्ट्रिक लोक, अपभ्रंश भाषा बोलणारे वैराष्ट्रिक व आभीर लोक महाराष्ट्रात येऊन मिसळले. त्यांच्या मिश्रणापासून मराठा समाज बनला व त्यांच्या भाषांपासून मराठी भाषा तयार झाली. मराठी भाषा प्रत्यक्ष जन्मण्यापूर्वीच्या संधिकालात एक दोन शतकं एखादी मिश्र प्राकृत किंवा मिश्र अपभ्रंश प्रचारात असावी. 

http://mhavaibhav2.blogspot.com
 
सिंधू लिपी ते ब्राह्मीची वाटचाल
 

निवेदनः सदर लेखन चर्चा म्हणून टाकण्याचा मानस होता पण लिहिताना त्याचे स्वरूप लेखाप्रमाणे झाल्याने लेख म्हणूनच प्रकाशित करत आहे. लेखनातील मुद्द्यांबाबत साशंकता असल्यास त्यावर अवश्य चर्चा व्हावी. खाली प्रकाशित केलेली गृहितके पक्की असल्याचा दावा लेखिका करत नाही परंतु दावे खोडून काढताना योग्य पुराव्यांचा आणि संदर्भांचा वापर करावा.

श्री. चंद्रशेखर यांनी काही दिवसांपूर्वी सिंधू संस्कृतीच्या र्‍हासामागचे कोडे या लेखातून मॉन्सूनच्या पावसातील झालेल्या फरकांमुळे सिंधू संस्कृतीतील शहरांतून नागरिकांचे स्थानांतर झाल्याचे गृहितक मांडले होते. सिंधू संस्कृतीचा र्‍हास कसा झाला या विषयी अधिक रोचक संदर्भ या पुढेही मिळत राहतील आणि अधिक संशोधने होत राहतील पण चंद्रशेखर यांचा लेख माझ्या लक्षात राहिल तो खालील वाक्याने -
मोठी शहरे नष्ट झाल्याबरोबर शहरी वास्तव्यासाठी उपयुक्त अशा लेखनासारख्या कला कालौघात नष्ट झाल्या.

हे एक वाक्य फारच रोचक वाटले. सिंधू संस्कृतीची लिपी ही खरेच लिपी आहे की नाही या विषयी तज्ज्ञांमध्ये मतभेद आहेत. याचे मुख्य कारण या लिपीचा अर्थ लावणे अद्याप शक्य झालेले नाही आणि लिपीचा अर्थ लावण्यासाठी ही लिपी मोठ्या प्रमाणात लिहिलेली आढळत नाही. या लिपीचा वापर करून लिहिलेली भूर्जपत्रे किंवा शिलालेख मिळालेले नाहीत. मुद्रांवर लिहिलेल्या त्रोटक लिपीतून अक्षर उकल होणे कठीण झाले आहे. सिंधू लिपीची वाढ शहरे नष्ट झाल्याने खुंटली. त्यानंतरच्या गंगा खोर्‍यातील संस्कृतींनी लेखनकलेवर लक्ष केंद्रित केले नाही. सिंधू लिपी नंतरची लिपी इ.स.पूर्व ५०० च्या सुमारास आढळते. म्हणजेच सिंधू संस्कृतीच्या र्‍हासानंतर सुमारे ६००-८०० वर्षे भारतीय उपखंडात लेखनकला वापरली जात नव्हती असे म्हणावे लागते. हा दावा किती खरा आणि किती खोटा ते पुढे पाहू.

स्वतंत्ररित्या जगात सर्वात प्रथम लेखनकला शोधल्याचा मान सुमेरियन संस्कृतीला जातो. (या लेखात मेसोअमेरिकन आणि चिनी लिपीचा विचार केलेला नाही.) युरेशियातील अनेक लिपी या सुमेरियन लिपीमुळे उदयाला आल्याचे मानले जाते. सुमेरियन कीलाकार लेखन (cuneiform writing) हे सर्वात आद्य समजले जाते. अर्माइक, ग्रीक, ब्राह्मी, खारोष्टी, इजिप्शियन चित्रलिपी, फोनेशियन, अरबी अशा अनेक लिपी या कीलाकारीवरून व्युत्पन्न झाल्याचे सांगितले जाते पण म्हणून या लिपी कीलाकारीची सख्खी अपत्ये आहेत अशातला भाग नाही. हे कसे ते पाहू. सुमेर संस्कृतीतून लेखनकला सर्वदूर पसरली ती दोन प्रकारे १. नीलप्रत (पुनरुत्पादन) आणि २. कल्पना विसरण (idea diffusion) च्या तत्त्वाने.
सुमेरियन कीलाकारी
सुमेरियन कीलाकारी
यापैकी पुनरुत्पादन प्रकाराला "नीलप्रत" (blueprint) असेही म्हटले जाते. याचे उत्तम उदाहरण म्हणून अनेक युरोपीय भाषांनी स्वीकारलेली रोमन लिपी. परंतु युरेशियातील ग्रीक, अरबी, अर्माइक, ब्राह्मी अनेक लिपींमध्ये आणि वर्णमालेमध्ये जो फरक जाणवतो त्यावरून येथे केवळ नीलप्रत न वापरता मूळ संकल्पनेत स्वतःच्या संस्कृतीला आणि भाषेला पूरक अशी नवी लिपी निर्माण केलेली दिसते.

मनुष्य लेखनकलेच्या कित्येक वर्षे आधी भाषा बोलायला शिकला. ध्वनी, शब्द, त्यातील चढ-उतार, विराम, अखंडता, शब्दांची जोडणी, आकडे, मोजणी वगैरे प्रमाणित करून या ध्वनींना संवादाचे साधन बनवण्यासाठी माणसाने हजारो वर्षे घेतली असावी पण या सर्वासाठी त्याला लेखनाची गरज नव्हती. इथे माझ्या एका जुन्या लेखातील थॉथची कथा आठवते. ती पुन्हा येथे देते -



थॉथ हा कला आणि विद्येचा इजिप्शियन देव. त्याला नवनवीन कला शोधण्याचा छंद होता. आपले संशोधन तो अमुन या सर्वोच्च इजिप्शियन देवाला आणि संपूर्ण इजिप्तच्या राजाला नेऊन दाखवत असे आणि त्याची प्रशंसा प्राप्त करत असे.
असाच एकदा थॉथला लेखनकलेचा शोध लागला. आपले नूतन संशोधन घेऊन थॉथ अमुनकडे गेला आणि उत्साहाने त्याने आपले संशोधन अमुनला सांगण्यास सुरुवात केली, “हे राजा, मी एक नवीन कला शोधली आहे. जी एकदा शिकून घेतली की समस्त इजिप्तवासी शहाणे होतील, विद्वान होतील आणि त्यांची स्मृती द्विगुणित होईल. या कलेद्वारे मी बुद्धिमत्ता आणि स्मृती यांवर अचूक तोडगा शोधला आहे.”

यावर नेहमी थॉथची प्रशंसा करणार्‍या अमुनने काही वेगळेच उत्तर दिले, “हे थॉथ! एखाद्या कलेला जन्म देणारा हा ती कला फायद्याची आहे किंवा नाही हे उत्तमरीत्या ठरवू शकत नाही. ही पारख त्या कलेच्या वापरकर्त्यांनी करावी. आता, तू या लेखनकलेचा जनक असल्याने येथे तुझे पितृवत प्रेम बोलते आहे आणि ते सत्य परिणामांच्या विरुद्ध आहे. खरंतर, ही कला तिच्या अभ्यासकांना विस्मरणाचे दान देईल. जे ही कला शिकतील ते आपल्या स्मरणशक्तीचा उपयोग करणे सोडून देतील कारण ते लेखनावर/ लिखाणावर आपली श्रद्धा कायम करतील. या चिन्हा-खुणांच्या बाह्यज्ञानामुळे माणसे आपल्या हृदयातून निर्माण होणार्‍या अंतर्ज्ञानाला विसरतील. आपापल्यापरीने वाचन केल्याने ते त्यातून आपल्याला हवा तसा अर्थ काढतील. तुझे संशोधन स्मृती वाढवण्यात कोणतीही मदत करत नाही, फक्त नोंद ठेवण्याच्या कामी उपयोगाचे आहे. हे संशोधन ऐकवल्याने (वाचून दाखवल्याने) लोकांना एकाच गोष्टीचे अनेक अर्थ कळतील. त्यांना आपण ज्ञानी झाल्याचा भास होईल परंतु प्रत्यक्षात त्यांना योग्य गोष्ट कळेलच असे नाही.”

अमुनचे म्हणणे खरे-खोटे पाडण्याच्या भानगडीत न पडता या कथेतीलही एक महत्त्वाचे वाक्य उचलते ते म्हणजे "तुझे संशोधन स्मृती वाढवण्यात कोणतीही मदत करत नाही, फक्त नोंद ठेवण्याच्या कामी उपयोगाचे आहे." यावरून अमुनला लेखनकलेचे सर्व फायदे लक्षात आले नव्हते असे म्हणावे लागेल. कदाचित, थॉथची उपलब्ध लेखनकला हे फायदे दर्शवण्याइतपत समृद्ध नसावी. परंतु या कथेत आणि वास्तवात साम्य असे की माणसाने लेखनकलेचा पहिला वापर नोंदी ठेवण्यासाठीच केला असे दिसून येते. या नोंदी मानवी भावना, काव्य, कथा, इतिहास यांसाठी नव्हत्या. या विस्तृत संवादासाठी जी मौखिक परंपरा वापरली जात होती ती तत्कालीन संस्कृतींना पसंत होती. किंबहुना, लेखनकलेचा विकास होण्यापूर्वी संवादकलेत मनुष्याने इतकी प्रगती केली होती की चटकन तो संवाद लिपीबद्ध करणे त्याला शक्य नव्हते. पुढील हजारो वर्षे माणसाने चित्रलिपी, शब्दावयव, चिन्हे-अक्षरे, विरामचिन्हे यांवर खर्च करून विस्तृत लेखनासाठी उपयुक्त अशा लिपींचा विकास केला.

लेखनाचा प्रथम वापर हा लेखांकन प्रक्रियेसाठी आणि तत्सम नोंदी राखण्यासाठी केला जाऊ लागला. सुमेरियन मृत्तिकापट्ट्यांवर अशाप्रकारच्या नोंदी आढळतात. याशिवाय, तत्कालीन राजांच्या विजयांच्या नोंदी, पिक-पाण्याच्या नोंदी, व्यापार, हुद्दे, शिक्के आणि ओळख पटवण्यासाठी वगैरे लेखनाचा वापर होत होता. पुढे तो वापर दानपत्रे आणि प्रचार, कायद्याची अंमलबजावणी यासाठी होऊ लागला. वेगळ्या शब्दांत, लोकशिक्षण, गद्य-पद्य लेखन, मनोरंजन वगैरेंसाठी लेखनकला वापरली जात नव्हती त्यामुळे लेखनाचा वापर करणारे अतिशय मोजके होते आणि लेखनाची महती न कळलेले अनेक होते.

आता या पार्श्वभूमीवर सिंधू लिपीकडे बघू.

सिंधू लिपी हे सुमेरियन कीलाकारीचे सख्खे अपत्य मानण्याबद्दल तज्ज्ञांत मतभेद आहेत परंतु कीलाकारीच्या कल्पना विसरणातून सिंधू लिपी निर्माण झाली असावी याबाबत फारसे मतभेद दिसत नाहीत. म्हणजेच, सिंधू लिपी ही स्वतंत्र लिपी नसून ती सुमेरियन किंवा आजूबाजूच्या इतर संस्कृतींकडून उसनी घेऊन आकारास आणलेली आहे. एखाद्या संस्कृतीत एखादे नवे संशोधन झाले आणि त्या संस्कृतीने ते वापरात आणले की त्या पहिल्या संस्कृतीशी साधर्म्य साधणार्‍या किंवा तिच्या जवळपास प्रगती साधलेल्या इतर संस्कृती ते संशोधन स्वीकारतात किंवा आपल्या पथ्यावर पडेल असे बदल करून स्वीकारतात. या स्वीकार करण्यात अर्थातच अनेक निकष असतात. उदा. गरज, फायदे-तोटे, सांस्कृतिक आणि धार्मिक समज वगैरे. साधारणतः कल्पना विसरणाचे पाच भाग मानले जातात. ज्ञान, मनवळवणी, निर्णय, अंमलबजावणी आणि स्थायीकरण.
सिंधू लिपीतील शिक्का
सिंधू लिपीतील शिक्का
पहिले दोन भाग ज्ञान आणि मनवळवणी सहजगत्या उपलब्ध झाले नाहीत आणि नवे संशोधन स्वीकारण्याचा निर्णय झाल्यास मिळालेले ज्ञान किंवा संशोधन जसेच्या तसे वापरणे कठीण होऊ शकते पण अंमलबजावणी करण्याचे निश्चित केले असल्यास मूळ संशोधनाला नजरेसमोर ठेवून एक समरुपी पर्यायी पद्धत निर्माण करता येते. सुमेरियन कीलाकारीवरून व्युत्पन्न झालेल्या अनेक लिपींमध्येही हेच साम्य दिसून येते आणि म्हणूनच शेजार्‍यांकडून स्वीकारलेल्या या लिपी जशाच्या तशा न स्वीकारता थोड्याफार फरकांनी किंवा अधिकच्या संकल्पनांची भरती करून स्वीकारल्या गेल्या.

सिंधू संस्कृतीने लिपी स्वीकारायचे मुख्य कारण व्यापार हे असावे. मध्य आशियाई संस्कृतींशी व्यापार करताना त्यांना शिक्के, चलन, ओळखपत्रे यांवरून तेथील लिपीची ओळख झाली असावी. ही मर्यादित ओळख स्वीकारण्यामागे उद्देशही व्यापारात एकसूत्रता राहणे हा असावा. ज्या संस्कृती तगल्या, वाचल्या आणि फोफावल्या त्या स्थायी संस्कृतींनी लेखांकन, ओळखपत्रे, दानपत्रे यांच्या पुढे जाऊन लिपीमध्ये सुधार केले, नवे संशोधन केले, अक्षरओळख, वर्णमाला, स्वरनिश्चिती इ. मधून सुधारित लिपी जन्माला आली. सिंधू संस्कृतीच्या र्‍हासामुळे या सुधारणांना खीळ बसली आणि सिंधू लिपी उत्क्रांत झाली नाही.

काही तज्ज्ञांच्या मते सिंधू लिपीच्या खुणा ब्राह्मी लिपीत दिसतात पण याला म्हणावे तेवढे पुरावे देणे अद्याप जमलेले नाही त्यामुळे बहुतांश तज्ज्ञ ब्राह्मी लिपी ही अर्माइक लिपीवरून व्युत्पन्न झाल्याचे मानतात त्यालाच ग्राह्य धरलेले आहे. सिंधू लिपीनंतर ब्राह्मी लिपीच्या वापरापर्यंत सिंधू खोरे सोडून पूर्वेकडे वळलेली संस्कृती शेतजमीन, पशुपालन, शासन, सुव्यवस्था यांचा पुनर्विकास करण्यात व्यग्र झाली. या काळात मध्य आशियाशी असणार्‍या व्यापारावर परिणाम झाला असण्याची शक्यता वगळता येत नाही. एकंदरीत या सर्व स्थित्यंतरांमुळे सिंधू संस्कृतीत उदयाला आलेली लेखनकला खुंटली. असाच काहीसा प्रकार "लिनिअर बी" आणि ग्रीक या दोन लिपींच्या बाबत झाल्याचे दिसते. म्हणजे, भारतीय समाज या मधल्या काळात निरक्षर राहिला का? याचे उत्तर स्थलांतरित झालेल्या बहुतांश भारतीय समाजाने काही काळापुरता लेखनाला बाजूला सारले असेच द्यावे लागते आणि त्यानंतर लेखनाचे महत्त्व ध्यानात आल्यावर पुन्हा एकदा शेजार्‍यांकडून लिपी उसनी घेऊन तिला आपल्या समाजात रुळवण्याचे प्रयत्न सुरू केले. या प्रयत्नांना मूर्त स्वरूप येण्यास ६००-८०० वर्षांचा काळ लागला.

अशोककालीन ब्राह्मी शिलालेख
अशोककालीन ब्राह्मी शिलालेख
सिंधू संस्कृतींचे स्थलांतर न होते तर सिंधू लिपी उत्क्रांत होऊन सद्य भारतीय लिपींचा चेहरामोहरा वेगळा भासला असता. मात्र तसे न झाल्याने पुनश्च सेमेटिक लिपींशी संबंध आल्यावर कल्पना विसरणाच्या तत्त्वानुसार पुन्हा एकदा लेखनकलेला आपलेसे करून घेण्याचे प्रयत्न सुरू झाले आणि ब्राह्मी, खारोष्टीच्या रुपाने भारतीय संस्कृतीत पुन्हा एकदा लेखनकलेच्या विस्तारास प्रारंभ झाला. या मधल्या काळात जी मूळ लिपी उसनी घेतली गेली ती उत्क्रांत झाल्याने (येथे अर्माइक) तिच्यावरून बेतलेल्या ब्राह्मीचा आणि त्या पुढील लिपींचा विस्तार झपाट्याने झाला आणि लेखन केवळ शिक्के, ओळखपत्रे, रेकॉर्ड किपिंग आणि प्रचार यापुरते सिमीत न राहता महाकाव्ये, पुराणे इ. द्वारे लोकशिक्षणाच्या मार्गाने लिपींची वाटचाल सुरू झाली.

 सिंधू लिपी संदर्भात राजेश राव यांनी व्यक्त केलेले मत... सिंधू लिपी ही लिपी आहे का? या लिपीचा अर्थ कसा लावायचा? संगणकाच्या सहाय्याने शास्त्रद्न्यांनी घेतलेला शोध आणि मिळालेले आश्चर्यकारक निष्कर्ष ... या दुव्यावर व्हिडिओ पाहता येईल.

राजेश राव यांनी व्यक्त केलेले मत पटण्यासारखे आहे. सिंधू लिपी ही "रिबस प्रिन्सिपल" वर आधारित असल्याचे आधीच स्पष्ट झालेले आहे पण नेमकी भाषा कोणती बोलली जात होती हेच माहित नसल्याने बाकी सर्व केवळ गृहितके आणि अंदाज ठरतात. तेव्हा "रोजेटा स्टोन" हा एकमेव उपाय शिल्लक राहतो.

सिंधू संस्कृतीची लिपी ही खरेच लिपी आहे की नाही या विषयी तज्ज्ञांमध्ये मतभेद आहेत.
ब्राम्ही आणि सिंधू संस्कृतीची लिपी एकच असे समजत होतो. ते तसे नसावे असे लेखावरून् वाटते.

स्वतंत्ररित्या जगात सर्वात प्रथम लेखनकला शोधल्याचा मान सुमेरियन संस्कृतीला जातो.
इजिप्शिअन हे सुमेरिअमनांपेक्षाही प्राचीन होते. सुमेरिअन उदयास येण्याच्या काळात, स्थिरस्थावर होण्याच्या काळात त्यांनी
विकासाचा पुढचा टप्पा गाठला होता असे ऐकले आहे. इथे उलट् चित्र् दिसते आहे. सुमेरिअन इतर कुठल्याच क्षेत्रात पुढे आलेले कसे दिसत नाहित् मग? (धातूकाम, शिल्पकला, हत्यारे,दगडि बांधकाम वगैरे) त्या सर्व क्षेत्रात इजिप्शिअन् पुढे कसे?
लिखित लिपी मागाहून् शिकूनही ते पुढे कसे जाउ शकले?

चिनी लिपीचा विचार केलेला नाही.
अवांतर होइल, पण इजिप्त आणि सुमेरिअन(कदाचित सिंधू संस्कृतीही) ह्यांच्या लिपी चिनी लिपीपेक्षा नक्कीच जुन्या असाव्यात.
चिनी लिपी शोधली तो कोण शास्त्रज्ञ मुख्य सम्राट चिन् ह्याच्या कारकिर्दिच्या आसपासच होउन गेला म्हणतात. म्हणजे बुद्धाच्या , सॉक्रेटिसच्या किंवा कन्फ्युशिअसच्या मागेपुढे.

दुसरी तक्रार :_ ह्या सगळ्या गोष्टी "तिकडून् इकडे " अशाच का येत? "इकडून् तिकडे "का जात नसत?
शक-कुषाण-हूण् तिकडून् इकडे येणार, नंतर त्याच मार्गाने खैबरजवळून अजून कुणाच्या घोड्यांच्या टापांचे विजयी स्वर् येणार.
अरे हो, खुद्द् घोडेच इथे नव्हते ना, घोडेही "तिकडून इकडे येणार" ....
इतकेच नाही आपण सर्रास भारतीय समजणारी मेथी सुद्धा इसवीसनाच्या काही शतकेच आधी भूमध्य समुद्राच्या आसपासच्या लोकांनी इथे आणली म्हणतात? अरे सगळच तिकज्ञ आलय तर इथलं आहे तरी काय? (कणेकरांचा "दगडांच्या देशा" आठवला.)

तुझे संशोधन स्मृती वाढवण्यात कोणतीही मदत करत नाही, फक्त नोंद ठेवण्याच्या कामी उपयोगाचे आहे.
हे म्हणजे एखाद्याला फुकटात उत्तम प्रजातीचा प्रशिक्षित घोदाअ फुकटात भेट दिल्यावर्र त्यानं "हात्तिच्या हे जनावर गायीसारखं दूध का देत नाही" असं विचारण्यासारखं आहे.

बाकी सिंधू लिपी डावीकडून उजवीकडे आणि पुन्हा उजवीकडून् डावीकडे अशी लिहिली जायची. ब्राम्हीची लेखनशैली कशी आहे?

आपल्याकडे सिंधू संस्कृतीनंतर बराच काळ काहीच दिसत नाही, थेट वैदिक काळ किंवा बुद्ध पूर्व काळच दिसू लागतो, तद्वतच ग्रीससुद्द्धा चारेकशे वर्षे "डार्क एज" मधून गेलेला दिसतो. काही जण मानतात त्या प्रमाणे अंधार युगापूर्वीचे ग्रीक् हे अंधार युगानंतरच्या ग्रीकांचे पूर्वज् नव्हते! आपली लिपी गायबली तशीच त्यांचीही अचानक् लुप्त् वगैरे झाली होती का?

वेळेअभावी इतकेच.

त्या सर्व क्षेत्रात इजिप्शिअन् पुढे कसे?
लिखित लिपी मागाहून् शिकूनही ते पुढे कसे जाउ शकले?

अरे तुम लेख पढ्या नहीं क्या? बाकी, इजिप्शियन पुढे कसे याचे उत्तर ७००० वर्षांपेक्षा जास्त इतिहास आणि संस्कृती असून युरोप आणि अमेरिका आपल्या पुढे कसे असा या प्रश्नाने द्यावेसे वाटते. :-) संस्कृती ही सतत बदलत असते. हवामान, जमिनीचा कस, रोगराई, हल्ले, लढाया यासर्वांमुळे संस्कृतीच्या प्रगतीवर परिणाम होऊ शकतो. तसेच, संस्कृतींनी प्रगती साधण्यात लिखित लिपीचा हात फारसा नव्हता. मोठी नगरे वसवणार्‍या सिंधू संस्कृतीतील लोकांनी नंतर मोठी शहरे का वसवली नाहीत याही प्रश्नाचे उत्तर तेच आहे.

अवांतर होइल, पण इजिप्त आणि सुमेरिअन(कदाचित सिंधू संस्कृतीही) ह्यांच्या लिपी चिनी लिपीपेक्षा नक्कीच जुन्या असाव्यात

इथे जुन्या-नव्याचा प्रश्न नसून स्वतंत्र लिपी शोधण्याचा विचार आहे.

ह्या सगळ्या गोष्टी "तिकडून् इकडे " अशाच का येत? "इकडून् तिकडे "का जात नसत?

पहिला माणूस अफ्रिकेतून का आला? या प्रश्नाच्या उत्तरावर इतर सर्व प्रश्नांची उत्तरे बेस्ड आहेत. :-) मनुष्य स्थलांतराचा नकाशा लावते. तो बरीच उत्तरे देईल.



हे म्हणजे एखाद्याला फुकटात उत्तम प्रजातीचा प्रशिक्षित घोदाअ फुकटात भेट दिल्यावर्र त्यानं "हात्तिच्या हे जनावर गायीसारखं दूध का देत नाही" असं विचारण्यासारखं आहे.

यात काहीच चुकीचे नाही. माझ्या लहानपणी घरात फोन आणि गाडी असणे हे ऐश्वर्याचे प्रतीक मानले जाई. गाडी कशाला हवी? पांढरा हत्ती. घरातून खाली उतरलं की रेल्वे स्टेशन आहे आणि बस डेपो आहे असे माझे वडिल म्हणत. याचप्रमाणे, माणसाला ज्या गोष्टीची गरज आहे ती त्याला हवी असते, जर गरज भागवणारी इतर साधने असतील किंवा गरजच नसेल तर त्या गोष्टीचे महत्त्व नसते. प्रवासासाठी किंवा लढाईसाठी घोडा नको असेल पण मुलांना खाऊपिऊ घालण्यासाठी दूध हवे असेल तर हे जनावर गाईसारखे दूध देत नाही असा विशाद व्यक्त होईलच.

बाकी सिंधू लिपी डावीकडून उजवीकडे आणि पुन्हा उजवीकडून् डावीकडे अशी लिहिली जायची. ब्राम्हीची लेखनशैली कशी आहे?

माझ्यामते सिंधू लिपी फक्त उजवीकडून डावीकडे लिहित जात होती. सिंधू लिपीच्या ओळीच्या ओळी मिळालेल्या नाहीत. ब्राह्मी डावीकडून उजवीकडे.

 

ब्राह्मी लिपीचा विषय चालू आहे म्हणून माझ्याजवळील काही वित्रे खाली जोडीत आहे. ब्राह्मी लिपीचे वाचन कसे करायचे ह्याच्यावर थोडा प्रकाश ह्यांतून पडतो.

ब्राह्मी लिपि सूत्र १
ब्राह्मी लिपि सूत्र १
ब्राह्मी लिपि सूत्र २
ब्राह्मी लिपि सूत्र २
पितळखोरा आणि भाजे ह्यांतील लेखांचे वाचन
पितळखोरा आणि भाजे ह्यांतील लेखांचे वाचन
लुंबिनी येथील एका लेखाचे वाचन
लुंबिनी येथील एका लेखाचे वाचन
सगळे 'तिकडून'च इकडे येते हे कसे असा प्रश्न मन ह्यांनी विचारला आहे. त्याविषयी मला असे वाटते की शेती करून स्थिर होण्याची प्रक्रिया मानवजातीमध्ये स्पसुममाररे १०,००० वर्षांपूर्वी मध्य आशियाच्या प्रदेशांमध्ये सुरू झाली त्यामुळे त्या भागात साम्राज्ये आणि प्रगत संस्कृतींची निर्मिति अन्य प्रदेशांच्या तुलनेने कित्येक सहस्र वर्षे आधी सुरू झाली. साहजिकच पहिल्यापहिल्या सहस्रकांमधून लेखनकला, कालगणना अशा गोष्टी 'तिकडून इकडे' आल्याचे दिसते. त्या केवळ इकडेच आल्या असे नाही, युरोपातहि तिकडूनच त्या पोहोचल्या.

ज्याला सगळ्या जगातील पहिले प्रस्थापित देऊळ म्हणता येईल अशी जागा, (गोबेकली टेपे - तुर्कस्तानातील उर्फा शहराजवळ) मिळाली आहे अशी समजूत आहे आणि ती सुमारे ९,००० वर्षांची जुनी आहे.

 

कोल्हटकरांचे, तिकडूनच इकडे कसे येते त्याचे स्पष्टीकरण योग्य आहे. माणसाला जेव्हा शेती करण्याची उपरती झाली तेव्हा हवामान, पीक, जमीन आणि पाणी यासाठी "सुपीक चंद्रकोरीचा" मेसोपोटेमियाचा प्रदेश पथ्यावर पडला. जिथे शेती सुरू झाली तेथे गरजेपेक्षा अधिक अन्नोत्पादन झाल्याने इतर कामांना, कलांना, संशोधनांना आणि राजकीय प्रगतीला चालना मिळाली. साहजिकच, त्यांची प्रगती आजूबाजूला स्थलांतरातून पसरली किंवा शेजार्‍यांनी उसनी घेतली.

कालांतराने वेगवेगळ्या गटांनी/ संस्कृतींनी आपापली स्वतंत्र प्रगती साधली परंतु ज्यांची प्रगती अधिक झाली त्यांच्यामार्फत नवीन संशोधने जगात इतरत्र पोहोचली.

----

खरे म्हणजे ब्राह्मीविषयी स्वतंत्र चर्चा सुरू करायला हवी. कोल्हटकरांना काही लिहिणे शक्य असल्यास त्यांनी लिहावे ही विनंती.

 या विषयाच्या संदर्भात मनात आलेले काही मुद्दे येथे मांडत आहे.अर्थात प्रियालीताईंनी लेखात जे विचार मांडलेले आहेत त्यांच्याशी मी पूर्ण सहमत आहेच.
1.सिंधू संस्कृती मधील मोहेंजोदाडो सारख्या मोठ्या शहरांचा मध्यपूर्वेमधील शहरांबरोबर मोठ्या प्रमाणात व्यापार चालत असे. हा व्यापार चालू राहण्यासाठी लिखित रेकॉर्ड स्वरूपातील, हुंड्या, पाठवलेल्या मालावर तो माल कोणाकडून आला आहे हे दाखवणारी लेबले, चलने, यासारख्या व्यापारी स्वरूपाच्या उपयोगासाठी वापरली जाणारी भाजलेल्या मातीची सील्स आढळून येतात. या शिवाय कोणतेही लिखित रेकॉर्ड मिळत नाही. यामुळे सिंधू संस्कृतीतील लेखनकला ही फक्त व्यापार नैमित्तिक होती असे म्हणावे लागते.
2.ब्राह्मी पिपीतील मूळाक्षरे कालाप्रमाणे खूप बदलत गेलेली आहेत. सम्राट अशोकाच्या शिलालेखातील ब्राम्ही मूळाक्षरे ही ग्रीक मूळाक्षरांच्या धाटणीवर लिहिलेली वाटतात. नाणेघाट ब्राम्ही आणखी निराळी आहे तर कार्ले किंवा नंतरच्या ब्राम्ही लिपीत जास्त गोलाकार वेलांट्या आल्याचे दिसते. इतिहास तज्ञ केवळ ब्राह्मी लिपीच्या धाटणीवरून त्या शिलालेखाचा काल ठरवू शकतात.
3.ब्राम्ही लिपी व प्राकृत या दोन्हींना अस्सल भारतीय म्हणता येईल असे मला वाटते. भारताचा वायव्य भाग, शिंजियांग (निया,खोतान मधील लाकडी पाट्या),अफगाणिस्तान या सारख्या कुषाणांचे वर्चस्व असलेल्या भागात भाषा प्राकृत असली तरी मुख्यत्वे शारदा आणि खरोष्टी लिपी वापरात होत्या. मात्र अशोकाच्या कालापासून भारतीय द्विपकल्पात तरी पुढे ब्राह्मी वापरात आली.


 

ब्राह्मीवर एखादा लेख यावा. विशेषतः वायव्य भागातील लिपी उजवीकडून डावीकडे लिहिल्या जात. सिंधूलिपी देखील उजवीकडून डावीकडे लिहिल्याचे दिसते. वर विडिओत राजेश राव म्हणतात की ओळ लिहिताना जागा संपली की शेवटी माणूस जी गिचमीड करतो ती गिचमीड शिक्क्यांच्या डावीकडे दिसते. (पण जर शिक्क्यांवर लिपी असेल तर ती उलट वाचायला हवी ना? [मिरर इमेज] तर मग ती डावीकडून उजवीकडे वाचायला लागेल.)

असो.

 
सिंधू संस्कृतीच्या र्‍हासामागचे कोडे
 

सिन्धु-सरस्वती संस्कृती
शरद
November 24, 2009 - 11:04 am
सिन्धु-सरस्वती संस्कृती

शाळेत असताना हडप्पा-मोहेंजोदडोबद्दल वाचलेले असते. सिन्धू नदीच्या काठी झालेल्या उत्खननात हजारो वर्षांपूर्वीची गावे सापडली व त्यात मडकी, खेळणी,मूर्ती, दागिने इत्यादी सापडले व ती आपल्या प्राचिन संस्कृतीची खूण आहे अशी जुजबी माहिती मिळते. महाराष्ट्रातही नद्यांच्या काठी उत्खनन केल्यावर अश्मयुग.ताम्रयुग व लोहयुग या तीन काळातील अवषेश मिळाले अशीही माहिती पुढे कानावरून गेली. पण पूरातत्वविभाग हा काही रंजनाचा विषय नाही, म्हणून तिकडे दुर्लक्षच झाले. वय वाढत गेले तसे कालबाह्यातही गोडी वाटण्यासारखे आहे असे वाटू लागले व २००० वर्षांमागची लेणी पहातो तर त्या आधी २००० वर्षे काय असावे याचे निदान वाचन तरी होऊ लागले. श्री.चंद्रशेखर यांच्या लेखानंतर वाटू लागले की या संबंधी काही माहिती उपक्रमावरही द्यावी.

(श्री. गुंडोपंत म्हणतात त्याप्रमाणे संदर्भ शेवटी देतात. मी आज सुरवातीला देण्याची मुभा मागतो. आज या विषयावर इतकी माहिती जालावर मिळते की इथे दिलेली माहिती ही समुद्रातल्या थेंबाप्रमाणे आहे. आपण Indus civilization किंवा Pre-Hadappa Civilization अशा जागांवर गेलात तर आपणास १५,००० पेक्षा अधीक ठिकाणी अशी
माहिती मिळेल. मी त्यातली किती देऊ शकतो ? या लेखाचा उद्देश "तीळा तीळा, दार उघड" म्हणणे एवढाच आहे. आपण आपापल्या आवडीप्रमाणे खजिन्यातले उचला.)

कराची-लाहोर लोहमार्ग बांधत असतांना दगडांची गरज होती. हडप्पा गावापाशी विटांचे ढीग सापडले.ते लोहमार्गाकरिता वापरले. नंतर ज.कनिंगहॅमला तेथे काही शिक्के, मातीची भांडी, खेळणी आढळली.तेथे १९२०च्या सुमारास उत्खननाला सुरवात झाली. सिन्ध प्रांतात मोहेंजेदाडो येथे एका बुद्ध स्तुपाशेजारी खणतांना (१९२२) एक शहरच सापडले. ते व हडप्पा येथील साम्यावरून या संस्कृतीचा शोध लागला. ही स्थळे सिन्धू नदीच्या किनार्‍यावर असल्याने त्यांना Indus Civilzation सिन्धुसंस्कृती म्हणून ओळखले जाऊ लागले. मोहेंजेदडो येथे एकावर एक असे सात स्थर सापडले.काळ ठरवण्यात आला इ.स.पूर्व ३००० ते इ.स.पूर्व १४००. काय सापडले या उत्खननात ?
ग्रामरचना :
या शहरात काटकोनातले प्रशस्त रस्ते होते.विटांनी बांधलेली घरे होती. प्रत्येक घरामध्ये विहिर, न्हाणीघर-शौचालय होते. सांडपाणी वाहून नेण्याकरिता विटांनी बदिस्त गटारे होती. ती एका मोठ्या गटाराला जोडून गावाबाहेर काढली होती. सार्वजनीक स्नानघर होते. स्मशान होते. धान्य साठवावयाची गोदामे होती. गावाभोवती तटबंदी होती पण ती हल्ल्या पासूनच्या बचाव्याकरिता नव्हती, पुराचे पाणी गावात येऊ नये या करता होती. रस्त्यावर दिव्याकरता खांब होते. थोडक्यात कार्यक्षम स्थानिक स्वराज्य संस्था कार्यरत होती.
उद्योगधंदे :
शेती व व्यापार हे प्रमुख.व्यापार खुष्कीने व जलावरून. दक्षीण व पूर्व भारत तसेच सुमेर, इजिप्त,क्रीट इ. परदेशांशीही. सूत कातण्याची व वस्त्रे विणण्याची उपकरणे सापडली आहेत.
कापूस व लोकर यांची (रंगीतसुद्धा) वस्त्रे वापरात व व्यापारात होती.धातू, रत्ने, दगड, मणी, अलंकार,हस्तीदंताच्या नक्षीदार वस्तू, ह्या इतर वस्तू. तांबे बाहेरून आणून कांसे बनवत.
समाजरचना :
चार वर्ग : विद्वान व पुरोहित, क्षत्रिय,व्यापारी (व कारागीर) आणि कामगार. राजे, सरदार, गुलाम यांची प्रथा दिसत नाही.
देवधर्म :
पशुपति(शिव), मातृदेवता ( काली ?) इत्यादींच्या मूर्तींवरून प्राक ऐतिहासिक कालातील हिंदूधर्माची सुरवात वाटते.
मर्तिकप्रथा :
पुरणे व जाळणे, दोन्हीही प्रचारात होत्या.
लिपी :
चित्रलिपीच्या मुद्रा सापडल्या आहेत परंतु अजूनपर्यंत तीचा उलगडा झालेला नाही. ब्राह्मी लिपी हिच्यापासून निर्माण झाली असावी असे वाटते.
कालखंड :
इ.स.पूर्व ३५०० च्या आसपास सुरवात व इ.स.पूर्व १४०० च्या सुमारास लोप.

ही संस्कृती कशी लोप पावली या बद्दल जास्त माहिती द्यावयाची असली तरी ती पुढच्या भागात.इथे तीचा विस्तार कसा झाला त्याची माहिती घेऊ. १९२० च्या सुमारास
उत्खननास सुरवात झाली व ३० वर्षे सुस्तीतच गेली म्हटले तरी चालेल. पण नंतर भारताची पंचाइत झाली कारण हडप्पा-मोहेंजेदाडो पाकिस्थानात गेले. त्यामुळे ASI ने
(भारतीय पूरातत्व विभाग)राजस्थान, पंजाब,हरियाना वगैरे भागात धूमधडाक्याने उत्खननास सुरवात केली. सिंन्धू राहिली दूर, संस्कृती उभी रहावी अशी नदीही जवळपास
नाही.एक घगरा आहे पण ती तर लुकडी-सुकडी. तरीही धक्का बसावा अशी गोष्ट म्हणजे या भागात अशा २५०-३०० जागा सापडल्या.जरा उंचवटा दिसला की हाणा कुदळ, खाली ४००० वर्षांपूर्वीचे एक गाव, किमान खेडेगाव तरी हजर.व त्याच संस्कृतीचे. पाकिस्थानही मागे कसे रहाणार ? त्यांनाही तीच सफलता.एकुण जागा आठशेच्यावर.आणि कुठेकुठे ? उत्तरेस काश्मिर-बलुचिस्थान, पश्चिमेस इराणची हद्द, दक्षिणेस गोदावरीपर्यंत व पूर्वेस दिल्लीच्याही पलिकडे. जगातील सर्वात आकाराने मोठी पूरासंस्कृती ! दोन-तीन गोष्टीत ही संस्कृती तत्कालीन इजिप्त-सुमेरिअन संस्कृतींपेक्षा एकदम वेगळी होती. इथे सम्राट नव्हते; त्यामुळे त्यांचे पुतळे, पिरॅमिड वगैरेंची गरज भासत नव्हती. शांतताप्रिय असल्याने गावाभोवती संरक्षणाचे तट नव्हते. रस्ते, पिण्याच्या पाण्याची, सांडपाण्याच्या निचर्‍याची इत्यादी नियोजनबद्ध सोय होती.
धान्याची कोठारे होती. पण यापेक्षाही विस्मयजनक गोष्ट ही होती की वर जेथे खणत होते तेथे पाणी नव्हते पण खाली जेथे गाव होते तेथे विपुल पाणी असावे अशा खुणा होत्या. म्हणजे ४००० वर्षांपूर्वी तेथे विशाल नदी होती व आता तेथे ओसाड रण होते ! चक्रावलेल्या शास्त्रज्ञांनी वेदात शोध घेतला आणि त्यांना सापडली " सरस्वती".
ऋग्वेदातील पूज्य नदी. हिमालयात उगम पाऊन,सिन्धूला समांतर वहात जाऊन गुजराथमध्ये समुद्राला मिळणारी. कालौघात, नैसर्गीक कारणांनी तीचे पाणी कमीकमी होऊ लागले. ती समुद्राला मिळावयाच्या ऐवजी राजस्थानात लुप्त झाली. व नंतर संपूर्णत: नाहिशी झाली.संस्कृत वाङमयात तीचा संपूर्ण इतिहास पहावयास मिळतो. तर आपली ही प्राचिन संस्कृती तीच्या काठची. सिन्धू नदीच्या काठच्या गावांपेक्षा किमान ५-६ पट गावे हीच्या काठावर सापडली. म्हणजे हरप्पा संस्कृतीला खरे म्हणजे सरस्वती संस्कृती म्हणावयाला पाहिजे. आता सर्वजण "सिन्धु-सरस्वती" संस्कृती म्हणतात. नवीन उपकरणे व यंत्रे यांनी तीचा सर्व लुप्त प्रवाह आता दृगोचर झाला आहे.
मी आज दोन नकाशे देत आहे. एकात सरस्वती नदीचा प्रवास पहावयास मिळतो तर दुसर्‍यात हरप्पा-पूर्व, हरप्पा-सुरवात, हरप्पा-मध्य व हरप्पा -लय या कालप्रवाहातील उत्खनन स्थाने पहावयास मिळतात.
माझी उपक्रमवासीयांना नम्र विनंती आहे की त्यांनी जालावरून आपल्याला आवडलेली उत्खननात सापडलेल्या वस्तूंची चित्रे येथे द्यावीत (जशी देवळांची दिली होती).
दुसर्‍या भागात ही संस्कृती कशी लुप्त झाली त्याची मिमांसा करू.
शरद
(१)sarasvati river

(२)harappa


सुंदर
गुंडोपंत [25 Nov 2009 रोजी 11:01 वा.]
सुंदर लेख, आवडला आहे.

आपले सरस्वती संस्कृती असण्याचे म्हणणे कदाचित योग्याही असेल असे वाटून गेले.
जालावर शोध घेतला असता हा दुवा मिळाला.

http://www.harappa.com/indus/indus0.html
भरपूर चित्रे आणि माहिती येथे आहे.

या शिवाय काही ठिकाणी असेही वाचले की सिंधु संस्कृती नंतर लोक गंगेकडे सरकले. ते मात्र मला तेव्हढे पटले नाही. आणि संदर्भासाठी तो दुवाही सापडला नाही..
असो,

आपला
गुंडोपंत


काही संदर्भ
गुंडोपंत [26 Nov 2009 रोजी 02:15 वा.]
जालावर अजून शोध घेतला असता,
एन्सायक्लोपेडिया इंडिका ही संदर्भ ग्रंथ मालिका महत्त्वाची वाटते.
या मालिकेचे संपादक एस एस शशी आहेत. यात भरपूर माहिती तर आहे. शिवाय अनेक चित्रेही आहेत.
दुसरा संदर्भ ग्रंथ म्हणजे एन्सायक्लोपेडिया ऑफ इंडिया
यातही माहिती आहे पण हा तुलनेने नवा आहे. आणि हा सर्व भारता विषयी नवी जुनी माहिती देतो.
मला तरी एन्सायक्लोपेडिया इंडिका ही मालिका महत्त्वाची वाटते.

या सोबतच 'प्राचीन भारतीय कला' या संदर्भातही शोध घ्यायला हवा असे माझे मत आहे. यावर सुमारे १९५० च्या दशकातही भरपूर लिखाण झाले आहे. परंतु ते सर्व जालावर उपलब्ध असेलच असे नाही.
असो,
तूर्तास इतकेच.

आपला
 

 

 

भारतीय द्वीपकल्पामध्ये कधी काळी अस्तित्वात असणार्‍या व सर्वात पुरातन असलेल्या सिंधू संस्कृतीचा शोध 1920च्या दशकात प्रथम लागला. त्या काळापासून ते आजपर्यंत, सिंधू नदीच्या खोर्‍यामध्ये आणि पंजाब मधील सिंधू नदीच्या उपनद्यांच्या खोर्‍यांमध्ये, अगदी समुद्र तटापासून ते हिमालयाच्या पायथ्यापर्यंतच्या प्रदेशापर्यंत, विपुल प्रमाणात उत्खनन व या संस्कृतीबद्दल संशोधन केले गेलेले आहे. या संशोधनाचे फलद्रूप म्हणून आता सर्वसाधारणपणे असे मानले जाते की सिंधू नदीच्या खोर्‍यामध्ये व सध्याच्या पाकिस्तान मधील मेहरगढ या गावाजवळ खेडेगाव या स्वरूपातली मानवी नागरी वस्ती सर्वप्रथम इ.स.पूर्व 4500-5000 या कालात वसवली गेली. या मानवी वसाहतींचे मोहोंजोडारो किंवा हडाप्पा सारख्या मोठ्या शहरांच्यात इ.स.पूर्व 3900 च्या सुमारास रूपांतर झाले व ही शहरी वस्ती इ.स.पूर्व 1500 या कालापर्यंत तरी अस्तित्वात होती.

सिंधू संस्कृतीचा काल व स्वरूप यासंबंधी जरी एकवाक्यता असली तरी ऐन बहरात असलेल्या या संस्कृतीचा एकाएकी व अचानक र्‍हास का व कसा झाला? या कोड्याचे समाधानकारक उत्तर आजपर्यंत तरी कोणालाही देता आलेले नाही. मागच्या 80किंवा 90वर्षांत हे उत्तर देण्यासाठी आर्यांचे आक्रमण,मोठ्या प्रमाणातील भूकंप किंवा नदीपात्रातील मोठ्या प्रमाणातील फेरफार यासारखी कारणे दिली गेली. मात्र शास्त्रीय संशोधनाच्या मानकावर यापैकी कोणतेही कारण टिकू शकले नाही ही वस्तुस्थिती आहे.
वैदिक संस्कृतीचे मूळ आधार असलेल्या धर्मग्रंथांत, गंगा नदीच्या पश्चिमेला असलेल्या भारतीय द्वीपकल्पाच्या भूभागाचे सप्तसिंधू प्रदेश म्हणून वर्णन केले गेलेले आहे. या सात नद्यांपैकी सिंधू व तिच्या 5उपनद्या यांची सहज ओळख पटवता येते. वेदात, सरस्वती या नावाने व विशालता आणि सौंदर्य या दृष्टीकोनातून सर्वश्रेष्ठ नदी असा उल्लेख केली गेलेली, 7वी नदी मात्र ज्ञात इतिहास कालखंडात कधीच सापडलेली नाही. धर्मग्रंथातील उल्लेखाप्रमाणे ही नदी हिमालयातील हिमनदापासून उगम होत असून तिचे जल, पर्वत ते समुद्र किनारा या संपूर्ण प्रवासात अतिशय शुद्ध असल्याचे मानले जाते. पंजाबमधील हाकरा खोर्‍यात वाहणारी घग्गर नदी ही धर्मग्रंथातील सरस्वती नदी बहुदा असावी असे आता अनेक तज्ञ मानतात. मात्र या घग्गर नदीला कोणत्याही हिमनदाकडून जल पुरवठा न होता फक्त मॉन्सूनच्या पाऊसकाळातच पाणी असते व पुढे ही नदी कोणत्याच समुद्राला जाऊन न मिळता या नदीचे पाणी हाकरा खोर्‍याच्या टोकास असणार्‍या वाळवंटात फक्त लुप्त होते ही गोष्ट नमूद करणे आवश्यक आहे.

सिंधू संस्कृतीचा झालेला अचानक र्‍हास व सरस्वती नदीचे अदृष्य होणे या दोन गोष्टी,भारतीय द्वीपकल्पाच्या प्राचीन इतिहासातील सर्वात अतर्क व अगम्य असलेली गूढे म्हणून यामुळेच मानली जातात. Proceedings of the National Academy of Sciences या प्रकाशनाच्या 28मे 2012 रोजी प्रसिद्ध झालेल्या अंकात या दोन्ही कोड्यांची उकल करण्यात शास्त्रज्ञांचा एक गट यशस्वी झाला असल्याचे नमूद केले गेले आहे. Woods Hole Oceanographic Institution (WHOI) या संस्थेत संशोधन करणारे Liviu Giosan या भूशास्त्रज्ञाच्या नेतृत्वाखाली संशोधन करणार्‍या 16शास्त्रज्ञांच्या एका आंतर्राष्ट्रीय गटाने या दोन्ही कोड्यांची उत्तरे शोधण्यात आपल्याला यश आले आहे असा दावा केला आहे. चेन्नई येथील Institute of Mathematical Sciences या संस्थेतील एक शास्त्रज्ञ श्री. रोनोजय अधिकारी हे भारतीय शास्त्रज्ञ सुद्धा या गटाचे एक कार्यरत सभासद होते. शस्त्रज्ञांच्या या गटाने 2003ते 2008या कालखंडात पाकिस्तान मधील अरबी समुद्र काठचा भाग, पंजाबमधील सुपिक खोरी, थर वाळवंटाचा उत्तरेचा भाग या सर्व भूभागाचा बारकाईने अभ्यास करून आपले निष्कर्ष काढले आहेत. या गटाने उपग्रहावरून प्राप्त झालेली छायाचित्रे व Shuttle Radar Topography Mission या मोहिमेकडून प्राप्त झालेली भूपृष्ठरचनेसंबंधीची माहिती (topographic data) यांचा वापर करून सिंधू व इतर नद्यांच्या खोर्‍यामधील भूपृष्ठ वैशिष्ट्यांचे (landforms) डिजिटल नकाशे प्रथम तयार केले. या विश्लेषणात्मक कार्याला सर्व नद्यांच्या खोर्‍यांना प्रत्यक्ष भेटी देऊन जमिनीत खोल बोअर आणि खंदक स्वरूपी खड्डे घेतले गेले व या खोल बोअर मधून मिळालेल्या जमिनीच्या कोअर्सचे क्रॉस सेक्शन्स व खड्यांच्या भिंतींचे क्रॉस सेक्शन्स यांच्या अभ्यासाची जोड देण्यात आली.
या सर्व माहितीच्या आधाराने Giosan यांच्या नेतृत्वाखालील या गटाला 5200 वर्षांपूर्वी (3100इ.स.पूर्व) सिंधू संस्कृतीचे वसतीस्थान असलेल्या सिंधू नदी व इतर नद्या यांच्या काठावरच्या सपाट भूपृष्ठांच्या आसमंतांची पुनर्र्चना संगणकावर करण्यात यश मिळाले. याच बरोबर हडाप्पा सारखी मोठी शहरे कशी वसवली गेली? व या नदीकाठच्या सपाट भूपृष्ठांच्या आसमंतांचा र्‍हास 3900 to 3000 वर्षांपूर्वी (1800 BCE- 900 BCE) या कालखंडात हळूहळू कसा होत गेला? हे नेमकेपणे सांगणे शक्य झाले. Giosan यांचा गट या अभ्यासानंतर खालील निष्कर्षांप्रत येऊन पोचला.

अरबी समुद्रापासून ते गंगेचे खोरे एवढ्या विस्तीर्ण व अंदाजे 10,00,000चौरस कि.मी. क्षेत्रफळ असलेल्या भूप्रदेशावर पसरलेली सिंधू संस्कृती ही प्राचीन नागरी संस्कृतींपैकी सर्वात मोठी असली तरी या संस्कृतीबद्दलची जगाला असलेली माहिती फारच अपुरी आहे. इजिप्त किंवा मेसोपोटेमिया येथील प्राचीन संस्कृतींप्रमाणेच सिंधू संस्कृती हीसुद्धा विशाल नद्यांच्या काठाने फुलत गेली. परंतु सिंधू संस्कृतीचे पुरातन अवशेष जसे आज अस्तित्वात असलेल्या नद्यांच्या काठी सापडतात त्याचप्रमाणे नदीपासून बर्‍याच दूर असलेल्या मरूभूमीमध्येही सापडतात. असे मानले जाते की दक्षिण एशिया खंडातील या पुरातन संस्कृतीत त्या वेळच्या जगाच्या लोकसंख्येच्या किमान 10टक्के तरी लोक रहात असावेत. असे असूनही 1920 सालामध्ये या संस्कृतीचा आधुनिक जगाला शोध लागेपर्यंत ही संस्कृती पूर्णपणे विस्मृतीच्या पडद्यामागे गेलेली होती. 1920 सालानंतर झालेल्या पुरातत्व संशोधनानुसार ही संस्कृती अतिशय वैशिष्ट्यपूर्ण नागरी संस्कृती होती.या संस्कृतीच्या अंतर्गत जी शहरे किंवा नगरे वसलेली होती त्यांच्यामध्ये चालू असलेल्या परस्पर व्यापारासाठी व्यापारी मार्ग तयार केले गेले होते. त्याचप्रमाणे मेसोपोटेमिया बरोबर या संस्कृतीचा समुद्र मार्गे व्यापार चालत असे. शहरांच्यात बांधलेल्या इमारती एका मानकाप्रमाणे बांधलेल्या असत. मैला व सांडपाणी वाहून नेण्यासाठी या शहरांच्यात उत्तम व्यवस्था केलेली असे. कला व हस्तकौशल्य यांना या संस्कृतीत महत्व होते व या संस्कृतीची स्वत:ची अशी लिपी लेखनासाठी होती. दुर्दैवाने ही लिपी अजुनही आपल्यासाठी दुर्बोधच राहिलेली आहे.

या अभ्यासात भाग घेतलेले व University College London येथे संशोधन करणारे भूशास्त्रज्ञ
Dorian Fuller म्हणतात की " या प्रदेशाच्या भू प्रस्तरांविषयी ही नवीन माहिती आम्हाला मिळल्यानंतर, या पुरातन संस्कृतीमधील वस्त्या ज्या ज्या ठिकाणी होत्या त्या वस्त्यांसंबधी पूर्वी ज्ञात असलेली माहिती, कोणती पिके येथे काढली जात होती? व येथील वस्त्या व कृषी उत्पादन कालानुसार कसे बदलत गेले? या सर्व बाबींची पुन्हा तपासणी आम्ही करू शकलो. या अभ्यासामुळे, सिंधू संस्कृतीतील लोकसंख्येचे, पूर्व दिशेला झालेले स्थलांतर, मोठ्या शेती कडून लघु आकाराची शेती करणार्‍या व शहराकडून छोट्या खेडेगावांकडे जाणार्‍या समाजरचनेची प्रक्रिया आणि उत्तर हडप्पा कालात झालेला शहरी लोकसंख्येचा र्‍हास या गोष्टींवर नवा प्रकाश टाकता आला."

सिंधू संस्कृती या अतिशय विशाल अशा भूप्रदेशावर वसली जाण्याच्या आधीची अंदाजे दहा सहस्त्र वर्षे तरी सिंधू व तिच्या उपनद्या वहात असलेल्या भूभागात मॉन्सूनचा पाऊस जवळ जवळ वर्षभर आणि तुफान स्वरूपात पडत होता व यामुळे या सर्वच नद्या अतिशय बेफाम स्वरूपात व कोठेही व कशाही वहात राहिल्या होत्या. नद्यांच्या या बेफाम वाहण्यामुळे या सर्व प्रदेशात नद्यांतून वहात आलेल्या व पिकांना अतिशय उपयुक्त असलेल्या गाळाचे थर या नद्यांनी रचले होते. Giosan यांच्या संशोधन गटाला सिंधू नदीच्या दक्षिणेकडील पात्राला समांतर असलेली, 10ते20मीटर उंच, 100पेक्षा जास्त किलोमीटर रूंद व अंदाजे 1000किलोमीटर लांबीची एक सपाट टेकडी किंवा पठार या कालात या बेफाम वाहणार्‍या नद्यांनी गाळाचे थर एकावर एक रचून निर्माण केल्याचे आढळून आले. या पठारवजा सपाट टेकडीचे या गटाने Indus mega-ridge असे नामाकरण केले आहे. आश्चर्याची बाब म्हणजे सिंधू संस्कृतीचे जे जे पुरातन अवशेष गेल्या 90वर्षात सापडलेले आहेत ते सर्व या Indus mega-ridge च्या जमिनीखाली न सापडता फक्त पृष्ठभागावरच सापडलेले आहेत.

या सर्व नद्यांना सतत पूर आणत रहाणारा मॉन्सूनचा पाऊस यानंतरच्या कालात कमी कमी होऊ लागला. यामुळे व हिमालयातून घेतले गेलेले पाणी कमी प्रमाणात नद्यांच्यात आल्याने या सर्व नद्यांचे बेफाम वागणे नियंत्रित झाले आणि या सर्व भूप्रदेशात कृषी उत्पादने घेण्यासदृष्य परिस्थिती निर्माण झाली. सिंधू व इतर नद्यांच्या काठाने अरबी समुद्र ते हिमालयाचा पायथा या सर्व प्रदेशात मानवी वस्त्या स्थापन झाल्या. कमी झालेल्या मॉन्सूनच्या पावसामुळे हडप्पा कालीन लोकसंख्येला उत्तम हवामान, भरपूर पाणी आणि सुपिक जमीन या गोष्टी मिळून एक मोठी सुसंधी प्राप्त झाली असे म्हणता येते. पुढची 2000वर्षे तरी टिकून राहिलेल्या या सुसंधीमुळे हडप्पा कालीन लोकसंख्येला या प्रदेशात एक मोठी संस्कृती निर्माण करण्यात यश मिळाले व आपल्या कष्टाळू व उद्यमप्रिय स्वभाव वैशिष्ट्यांमुळे त्यांनी या सुसंधीचे सोने केले. सिंधू व घग्गर-हाकरा नद्यांच्या काठालगत असलेल्या पाण्याच्या भरपूर उपलब्धतेमुळे सिंधू संस्कृतीचे मुख्य वैशिष्ट्य अमाप कृषी उत्पादन हेच राहिले होते. या कृषी उत्पादनासाठी मोठ्या प्रमाणात शेतमजुरांची आवश्यकता भासू लागली व त्यामुळे मानवी स्थलांतर सुरू होऊन मोहेंजोडारो किंवा हडप्पा सारखी मोठी शहरे निर्माण झाली.
मॉन्सूनचा पाऊस पुढे पुढे सतत कमी होत गेल्याने 2000वर्षांची ही सुसंधी आटत चालली व त्याच बरोबर विस्तृत प्रमाणात ज्या ठिकाणी पूर्वी मुबलक स्वरूपात पाणी उपलब्ध होते अशा भूभागाचे मरूभूमीकरण होण्याच्या प्रक्रियेला सुरूवात झाली. या मरूभूमीकरण प्रक्रियेमुळे हडप्पाकालीन लोकसंख्येचे पूर्वेकडे म्हणजे गंगा नदीच्या खोर्‍याकडे स्थलांतर साधारण 1500 इ.स.पूर्व या कालखंडापासून सुरू झाले. या भागातील मॉन्सूनचा पाऊस जरी स्थिर स्वरूपाचा असला तरी पावसावर अवलंबून असलेली शेती व नद्यानाल्यातील उपलब्ध पाणी हे फक्त छोट्या स्वरूपातील शेतीसाठीच उपयुक्त होते. या कारणामुळे सिंधू खोर्‍यातील मोठ्या शहरांसारखी शहरे गंगा खोर्‍यात निर्माण न होता मर्यादित स्वरूपाच्या शेतीच्या आधारावर टिकू शकतील अशा फक्त लहान नगर राज्यांची अर्थव्यवस्था येथे स्थापली गेली. मोठी शहरे नष्ट झाल्याबरोबर शहरी वास्तव्यासाठी उपयुक्त अशा लेखनासारख्या कला कालौघात नष्ट झाल्या. आणि स्थलांतरित जनसंख्या लहान लहान गावात विखुरली गेली.

या अभ्यासात आणखी एका गूढाचा उलगडा करता आला आहे असे हा अहवाल म्हणतो. ते गूढ म्हणजे सरस्वती नदी अदृष्य होण्यामागचे कारण. सरस्वती नदी म्हणजे सध्याची घग्गर नदी असेही हा अहवाल म्हणतो. घग्गर-हाकरा नदीच्या खोर्‍यात, हडप्पा कालात अतिशय दाट स्वरूपात वस्ती असल्याचे पुरावे या भागात केलेल्या उत्खननात आढळून आलेले आहेत. नदीच्या काठावर असलेले गाळाचे थर व नदी खोर्‍यातील भूपृष्ठभाग रचना या स्वरूपाच्या व या अभ्यासातून प्राप्त झालेल्या भूशास्त्रीय पुराव्याप्रमाणे या नदीचे पात्र खरोखरच विशाल व मुबलक पाणी असलेले होते असे दिसते. परंतु या कालात सुद्धा या नदीला असलेले मुबलक पाणी हे सध्याप्रमाणेच पण केवळ त्या काळात पडणार्‍या सशक्त मॉन्सूनच्या पावसामुळेच होते. या नदीला हडप्पा कालात सुद्धा हिमालयातून पाणी उपलब्ध होत नव्हते. त्याचप्रमाणे या नदीच्या जवळून वाहणार्‍या सतलज किंवा यमुना नद्यांमध्ये जे पाणी हिमालयातून येत होते ते या नदीच्या पात्रात वहात आल्याचा काहीच पुरावा मिळत नाही. या नदीला बारमाही पाणी असले तरी ते त्या काळातील सशक्त मॉन्सूनचेच होते.

या अभ्यासामध्ये, आजच्या घटकेला असलेल्या सिंधू नदीच्या जलसिंचन योजनांना एक धोक्याचा कंदील दाखवलेला आहे. या अभ्यास गटाचे प्रमुख Giosan म्हणतात की " आजमितीला सिंधू नदी जलसिंचन योजना ही जगातील सर्वात मोठी या स्वरूपाची योजना आहे. या योजनेत सिंधू नदीचे पाणी अनेक धरणे व कॅनॉल्स मार्फत अडवले गेलेले आहे. भूतापवृद्धीमुळे जर काही लोक म्हणतात तशी मॉन्सूनच्या प्रमाणात वाढ झाली तर 2010 सारख्या भयंकर पुरासारखी परिस्थिती कधीही निर्माण होऊ शकते. नियंत्रित स्वरूपात वाहणार्‍या सिंधू नदीवरील जलसिंचन योजना मॉन्सूनच्या पावसात वाढ झाल्यास केंव्हाही कोलमडू शकते.” पाकिस्तानसाठी हा एक धोक्याचा इशाराच समजला पाहिजे.

लेख आवडला. पाण्याच्या कमतरतेमुळे शेती करणे कठीण झाल्याने सिंधू संस्कृतीतील लोकांनी स्थलांतर केले यावर माझा विश्वास आहे.

मोठी शहरे नष्ट झाल्याबरोबर शहरी वास्तव्यासाठी उपयुक्त अशा लेखनासारख्या कला कालौघात नष्ट झाल्या.

येथे नेमके काय म्हणायचे ते कळले नाही. मोठी शहरे नष्ट झाली तरी गंगेच्या खोर्‍यात लहान नगर-राज्ये अस्तित्वात आली. माणूस जेव्हा शेती करतो आणि शेतीमुळे एका जागी वस्ती करतो तेव्हा कळपातील प्रत्येक माणसाला पोटासाठी अन्नोत्पादन करावे लागत नाही. कारण शेतीमुळे अनेकांची व्यवस्था लागेल इतके अन्नोत्पादन होते. अशावेळी संस्कृती जन्माला येते. शेतीवर आधारित नसणारे उद्योग (राजा, मंत्रीगण, सैन्य, लेखक, इतिहासकार, लेखनिक, कवी इ. ) आपोआप उदयास येतात. गंगेच्या खोर्‍यातही हेच झाले आणि स्थलांतर झाल्यावर माणूस लेखनकला विसरला नसावा असे वाटते.

या उलट, सिंधू संस्कृती लिपी ही अद्याप दुर्बोध असण्याचे एक कारण बहुधा अतिशय लहान स्वरुपातील लेखन (शिक्क्यांवरील लेखन) आहे असे दिसते. मोठमोठ्या टॅब्लेट्सवर किंवा खांबांवर, भुर्जपत्रांवर (भुर्जपत्रे तेव्हा तयार होत का या बाबत अनभिज्ञ आहे.) सिंधू संस्कृतीत लेखन झाल्याचे पुरावे मिळत नाहीत असे वाचले आहे. चू. भू. द्या. घ्या. मुद्रांवर लिहिलेले शब्द हे बहुधा मुद्राधिशांची नावे असण्याचा एक कयास व्यक्त केला जातो. यामुळेही डिकोडींग थोडे कठीण झाल्याचे सांगितले जाते. किंबहुना, सिंधू संस्कृतीत डेवलप झालेली लेखनकला ही प्रत्यक्ष लेखनलिपी आहे की केवळ चिन्हांत्मक चित्रलिपी आहे याबाबत मतभेद आहेत. व्यक्तिशः मला ती लेखनलिपी वाटत नाही. (सुरुवातीची लेखनलिपी ही विशेषतः, नागरिकांसाठी नियम, राज्यकारभाराच्या नोंदी, दानपत्रे आणि राजा किंवा शासनकर्त्याचे गुणगान या पद्धतीतील आहे.)

अशा परिस्थितीत, सिंधू लिपी ही अस्तित्वात असली तरी किती प्रचलित होती हे सांगता येत नाही. कदाचित, ती समाजातील अतिशय कमी लोकांकडून वापरली गेली असेल आणि त्यामुळे स्थलांतर होताना, नव्या वस्तीत, अन्नोत्पादनात आणि पुन्हा वस्ती करण्यात मग्न झाल्याने आणि ही लिपी आधीही महत्त्वाची भूमिका बजावत नसल्याने मागे पडली असेल असा एक अंदाज मांडते. चू. भू. द्या. घ्या.

अवांतरः सिंधू नदी खोर्‍याप्रमाणे गंगेच्या खोर्‍यात उत्खनन होऊन काही हाती लागल्याचे पुरावे आहेत का? माझ्या पाहण्यात तरी ब्राह्मी लिपी येईपर्यंत काही नाही. चू. भू. द्या. घ्या. म्हणजे इ.स. पूर्व ५००च्या आसपास. तोपर्यंत कोणतीही लिपी असल्याचे पुरावे मिळत नाहीत का?

स्थलांतर होताना, नव्या वस्तीत, अन्नोत्पादनात आणि पुन्हा वस्ती करण्यात मग्न झाल्याने आणि ही लिपी आधीही महत्त्वाची भूमिका बजावत नसल्याने मागे पडली असेल असा एक अंदाज मांडते.
अगदी बरोबर! अभ्यासगटाच्या अहवालात हेच म्हटले आहे असे मला वाटते. ही लिपी मुख्यत्वे सील्स आणि सीलिंग्स यावरच सापडलेली आहे आणि या दोन्ही गोष्टी धंद्यात वापरण्याचे चलन, वैयक्तिक ओळखपत्र, दागिना आणि एक टॅग या प्रकारच्या उपयोगांसाठीच वापरात होत्या असे पुरातत्व तज्ञ सांगतात.बहुसंख्य लोक जे शेतमजूर असणार त्यांना या लिपीशी फारसे देणेघेणे सिंधू काठीही नसावे व पूर्वेकडे आल्यावरही नसावे. ज्या कारणासाठी ही सील्स व सिलींग्स वापरली जात होती ती कारणेच न उरल्याने सील्स/सिलींग्स व त्याबरोबर लिपी आणि लेखनवाचनाची कला कालौघात नष्ट झाली असावी.

 

ऋग्वेदातील दहाव्या मंडलात वैदिक संस्कृतीकालीन नद्यांचे पूर्वेकडून पश्चिमेकडे जे वर्णन दिले आहे त्यात या नद्यांचे क्रमही अचूक आहेत. मुद्दा सरस्वतीचा असल्याने आपण पहिल्या दोन ओळींचा अर्थ बघू कारण पुढच्या दोन ओळीत सिंधू नदीच्या उपनद्या व मार्ग वर्णन केला आहे.

इमं मे गंगे यमुने सरस्वती शुतुद्रिस्तोमम् सचता परुष्ण्या
असिक्न्या मरुद्वृधे वितस्त्या आर्जीकीये श्रीणुहा सुषोमया
तृष्टामया प्रथम् यातवे सजु: सुस्र्त्वा रसया श्वत्या त्या
त्वम् सिंधो कुभया गोमतीम् क्रुमुम् मेहत्न्वा सरथम् याभिरीयसे
(गंगे, यमुने, सरस्वती, शतुद्रि (सतलज), परुष्णि (रावी), मरुद्व्रुधे व असिक्नि (चिनाब), आर्जिकिया, वितस्ता (झेलम) व सुसोम (सोहन) ऐका व माझ्या प्रार्थनेचा स्वीकार करा.)

यावरुन सरस्वती नदीचे स्थान यमुना व सतलज यांच्या मध्ये आहे, हे स्पष्ट होते. याच ऋग्वेदाच्या सातव्या मंडलात ही सरस्वती 'गिरीभ्यां आसमुद्रात्' वाहते, असा उल्लेख आहे. म्हणजे सरस्वतीचा उगम पर्वतीय प्रदेशात व विस्तार समुद्रापर्यंत आहे, हेही समजते. ज्या नदीचा उल्लेख ३२ वेळा आहे आणि जिला 'नदीतमे, अंबितमे, देवितमे (सर्वश्रेष्ठ नदी,माता व देवी) म्हटले आहे, ती केवळ पावसाच्या पाण्यावर अवलंबून नव्हती. तिला हिमालयातील पाण्याचा पुरवठा स्वतःचा व यमुना व सतलजमधून होत होता कारण या नद्या प्रारंभी सरस्वतीलाच मिळत होत्या. सरस्वती हिमालयाच्या पायथ्याच्या शिवालिक टेकड्यांमधून (गढवाल) उगम पावून हरयाणा व राजस्थानमध्ये येत होती व कच्छच्या आखातात अरबी समुद्राला मिळत होती (आजची घग्गर नदी हीच सरस्वती). यमुना, सरस्वती व सतलज यांचा संगम पतियाळाच्या दक्षिणेस ६०किलोमीटरवरील शत्राणा येथे होतो. पुढे अनुपगढजवळ या नद्यांचे प्रवाह बदलतात. भूकंप किंवा नैसर्गिक पात्र बदलण्याच्या सवयीने एकेकाळी सरस्वतीला विपुल पाणी पुरवणार्‍या यमुना व सतलजनेही प्रवाह बदलला. यमुना वळून पुढे गंगेला जाऊन मिळाली (अलाहाबाद), तर सतलज सिंधु नदीला मिळाली. जर सतलज पूर्वीपासून सिंधूला मिळत असती तर ऋग्वेदात वरील तिसर्‍या व चौथ्या ओळीत तिला सिंधूची उपनदी म्हटले असते. त्यात तर सिंधूच्या त्रिस्तमा, सुसर्तु, रसा, श्वेता, कुभा (काबुल),गोमती (गोमल), क्रमु (कुर्रम) व महलु या नद्यांचा उल्लेख आहेत.

यमुना व सतलजने प्रवाह बदलल्याने सरस्वतीचे खालच्या खोर्‍यातील पात्र रोडावत गेले व लुप्त झाले. तरीही आज ते घग्गर नदी किंवा हरयाणातील काही सरोवरे यांच्या रुपाने दिसून येते. यमुनेच्या खोर्‍यातील मातीचे नमुने घग्गरकाठच्या मातीशी जुळतात, हे उत्खननात पूर्वीच दिसले आहे. सरस्वतीचा प्रवाह आटल्याने तिच्या खोर्‍यातील रहिवाशांनी सिंधूच्या खोर्‍यात व गंगेच्या खोर्‍यात स्थलांतर केले. ऋग्वेदाची रचना मुख्यत्वे सरस्वती व सिंधू यांच्या दरम्यानच्या खोर्‍यात (सप्तसिंधु) झालेली असल्याने सरस्वतीचा उल्लेख ३२ वेळा तर सिंधुचा उल्लेख केवळ ३ वेळा येतो. ही श्रेष्ठ नदी आटल्याने मगच नाईलाजाने तेथील वैदिक संस्कृती सिंधु व गंगा खोर्‍यात विस्थापित झाली आणि लोकसंख्येचा लोंढा वाढल्याने पुढे मोहंजेदोडो व हरप्पासारखी नगरे विशाल झाली असावीत. अर्थात मागे एका धाग्यावर मी विधान केले होते तेच आजही वाटते. 'सिंधु संस्कृती ही अगदी भिन्न अशी संस्कृती नसून वैदिक संस्कृतीचाच एक उपसंच होती. हे लोक वरुणपूजक व वैश्य (ज्यात व्यापार, कृषिकर्म व गोपालन हे मुख्य व्यवसाय) होते. सिंधु नदी व वरुणाचे नाते ऋग्वेदात वर्णिले आहे. इंद्राने वज्राने पर्वत फोडून सर्व नद्यांना प्रवाहित केले असे इंद्राच्या स्तुतीपर ऋचांत म्हटले आहे. तसेच सिंधु नदी वरुणाच्या दरबारात त्याची सेवा करते, असाही उल्लेख वरुणसूक्तात आढळतो. सिंधु नदीच्या खोर्‍यातील जे वैदिकधर्मीय (सिंधी) भारतात विस्थापित झाले त्यांच्या परंपरागत जपलेल्या चालीरीती पाहिल्या तर त्यांच्यात झुलेलाल हा वरुणाचा अवतार देव म्हणून मानतात. सिंधी समाजावर ब्राह्मणी कर्मकांडांचा पगडा नाही आणि व्यापाराची ओढ त्यांच्या रक्तातच असते. यावरुनही त्यांचे वरुणपूजक वैश्यत्व पटू शकते.'

असो लेख चांगला आहे. 'आर्यांच्या आक्रमणाने सिंधु संस्कृतीचा नाश' ही मांडणी आधुनिक संशोधनाने फोल ठरवली आहे. पर्यावरण बदलाच्या मुद्यावरही विद्वानांची मतमतांतरे आहेतच. वारंवार दुष्काळ पडल्याने उपजीविकेवर संकट येऊन लोक विस्थापित झाले, हे सत्य असले तरी मान्सूनच्या चक्रात खूप मोठा बदल झाला नसल्याचेही जाणवते कारण एक सरस्वती सोडली तर ऋग्वेदात वर्णन केलेल्या बहुतेक नद्या आजही वाहात आहेत. म्हणजेच भूकंपाने उपनद्यांचे प्रवाह वळून पुढील नदी लुप्त होणे सत्याला जवळचे वाटते. सरस्वतीबाबत महाभारताच्या शल्यपर्वात एक कथा आहे. हीच कथा सारस्वत ब्राह्मण समुदायाच्या स्थलांतराचा उगम म्हणून सांगितली जाते. त्यानुसार सरस्वती आटू लागल्यावर तेथील वैदिक ब्राह्मण तो भाग सोडून जाऊ लागले. तेव्हा सरस्वती नदीने आपला पुत्र सारस्वत याला 'जाऊ नकोस. येथेच राहून वेदांचे रक्षण कर.' अशी विनंती केली. उपजीविकेसाठी मासे देण्याचे कबूल केले. सारस्वताने दीर्घकाळ मत्स्याहारावर राहून वेदांचे रक्षण केले. पुढे दुष्काळ सरल्यावर पुन्हा लोक आले व सारस्वत जिवंत असल्याचे बघून चकित झाले. तेव्हापासून सारस्वत ब्राह्मणांच्या आहारात मासे वर्ज्य नसल्याचे समजले जाते. असो. मुद्दा हा, की दुष्काळ संपल्यावर पाऊस पडल्यावर लोक पुन्हा पूर्वीच्या प्रदेशात परतत. मग सरस्वतीबाबत तसे का झाले नाही? अगदी १२ वर्षांचा दुर्गादेवीच्या दुष्काळाप्रमाणे काळ मानला तरी त्यानंतर तरी पावसाचे चक्र नियमित झाले असेलच. मग लोकांनी कायम स्थलांतर का केले असेल. याचेही उत्तर सरस्वतीचा प्रवाह कायमचा कोरडा पडला आणि त्याला मान्सूनखेरीज भूकंपामुळे भूस्तररचना व नदीप्रवाह बदलासारखे अन्य काही ताकदवानच कारण असले पाहिजे, यात आहे, असे मला वाटते.

 
ज्या घडामोडी वैदिक संस्कृती भारतीय द्वीपकल्पात प्रचलित होण्याआधी घडल्या आहेत त्या गोष्टींबद्दल वैदिक संस्कृतीच्या धर्मग्रंथांत काय सांगितले आहे ते कितपत ग्राह्य धरता येईल? वैदिक ग्रंथातील गत गोष्टींबद्दलची ही वर्णने ऐकिव माहितीवर अवलंबून असल्याने तितकीशी विश्वासार्ह धरता येणार नाहीत.

'सिंधु संस्कृती ही अगदी भिन्न अशी संस्कृती नसून वैदिक संस्कृतीचाच एक उपसंच होती.

हे वाक्य ' वैदिक संस्कृती ही अगदी भिन्न अशी संस्कृती नसून सिंधू संस्कृतीचाच एक उपसंच होती' असे लिहिल्यास इतिहासाला जास्त धरून व्हावे.
 

माझ्या प्रतिसादातून् मला काय म्हणायचे आहे ते स्पष्ट् झाले नसावे. एखादी घटना घडून् हजार् पाचशे वर्षे गेल्यावर् जेंव्हा एखादा कवी त्या घटनेवर् काव्य् करतो तेंव्हा त्या काव्याची विश्वासार्हता इतर् परिस्थितीजन्य पुरावा तपासल्या शिवाय् ग्राह्य् धरता येत् नाही असे मला वाटते.त्यामुळे त्या काव्याचे संदर्भ् देऊन् त्या घटनेबाबत् भाष्य करणे योग्य ठरणार् नाही.

उपलब्ध पुरावे वैदिक संस्कृतीला सिंधु संस्कृतीच्या पूर्वीचे ठरवतात.
हे वाक्य् मला पूर्णपणे मान्य् आहे. प्रश्न् एवढाच् आहे की ही वैदिक् संस्कृती भारतीय् उपखंडात् कधी आली? सिंधू संस्कृतीच्या आधी किंवा नंतर्? माझ्या मताने ती या लेखातील् स्थलांतरे घडून् गेल्यानंतर् आली. त्यामुळे वैदिक् काव्यातील् सरस्वती नदीबद्दलची वर्णने मला विश्वासार्ह् वाटत् नाहीत् व ती अतिरंजित् वाटतात्.

वैदिक संस्कृती यज्ञप्रधान (वेदी, पशुबळी, अग्नी), पशुपालक, कृषीप्रधान, चातुर्वण्य चौकटीची होती. त्याची चिन्हे सिंधु उत्खननात आढळली आहेत.
उत्खननात् आढळलेल्या या गोष्टींचे संदर्भ् (इतर् पुस्तके किंवा आंतरजाल्) श्री. योगप्रभू यांनी दिल्यास् माझ्या व इतर् वाचकांच्या माहितीत खूपच् मोलाची भर पडेल असे वाटते.
संस्कृतीचा /प्राचीन कालखंडाचा वेध घेताना इतिहास, भूगोल, पर्यावरण शास्त्र, धर्मशास्त्र, पुरातत्वशास्त्र, मानववंश शास्त्र, भूगर्भशास्त्र, खगोलशास्त्र, भाषाशास्त्र, नाणकशास्त्र अशा अनेक शाखांनी वेध घ्यावा लागतो. अलिकडे उपग्रह छायाचित्रण व संगणक तंत्रज्ञानानेही महत्त्वाचा हातभार लावला आहे. खरे अभ्यासक कुठच्याही साधनाला दुय्यम/अविश्वासार्ह लेखत नाहीत. नांणी, मुद्रा, दागिने, भांडी, शस्त्रास्त्रे, हाडे, राखेचे/मातीचे थर ही जशी साधने तशीच लिखित वर्णनेही शोध साधनांतच मोडतात. पुराणांबाबतही विश्वासार्हतेचे कारण दाखवून असेच प्रश्नचिन्ह उभे केले गेले. प्रा. पोर्जिटेर यांनी पुराणांचा चिकित्सक अभ्यास इतिहास समजून घेण्याचे उत्तम साधन ठरते, हे दाखवून दिले. अर्थात 'मला मानायचेच नाही,' असा पाया असेल तर तिथे संवाद खुंटतो. विश्वासार्हतेबाबत तुमचा दृष्टीकोन व्यक्त करण्याचे स्वातंत्र्य मानणे उचित ठरावे.

<< ' वैदिक संस्कृती ही अगदी भिन्न अशी संस्कृती नसून सिंधू संस्कृतीचाच एक उपसंच होती' असे लिहिल्यास इतिहासाला जास्त धरून व्हावे.>>

... माझ्या वाचनानुसार नाही. उपलब्ध पुरावे वैदिक संस्कृतीला सिंधु संस्कृतीच्या पूर्वीचे ठरवतात. वैदिक संस्कृती यज्ञप्रधान (वेदी, पशुबळी, अग्नी), पशुपालक, कृषीप्रधान, चातुर्वण्य चौकटीची होती. त्याची चिन्हे सिंधु उत्खननात आढळली आहेत.

भारतीय संस्कृतीचा अभ्यास करताना स्वतःला वाटेल अशा व्युत्पत्त्या रेटून सांगण्याचा काही पाश्चिमात्य विद्वानांचा खोडसाळपणा 'आर्यन थिअरी' मधून उघडा पडला आहे. अवांतर म्हणून अलिकडच्या काळातील एक गंमत नमूद करतो.

तुर्कस्तानात १९८३ ते १९९३ या काळात नेवाली कोरी भागात झालेल्या उत्खननात सापडलेल्या वस्तू अद्यापही तेथील संग्रहालयात आहेत. हे उत्खनन क्षेत्र मात्र आता त्या परिसरात झालेल्या धरणाच्या पाणीसाठ्यात लुप्त झाले आहे. या वस्तूंमध्ये तुळतुळीत गोटा व मागे रुळणारी शेंडी असा एक दगडी पुतळा सापडला आहे. (त्याचा फोटो गुगलवर नेवाली कोरी आर्टेफॅक्ट्स सर्चखाली चित्रसंग्रहात पाहता येईल.) आता याचे वर्णन करताना संशोधकांनी 'तत्कालीन रहिवाशांना डोक्यावर साप गुंडाळून सुशोभित करण्याची सवय असावी' असा तर्क मांडला, पण हे ब्राह्मणाचे शिखासहित मस्तकाचे शिल्प आहे, हे भारतीय संस्कृतीचा कुणीही माहीतगार बघताक्षणी सांगू शकतो. कार्बन डेटिंग पद्धतीने या वस्तूंचा कालावधी साडेआठ हजार वर्षे मागे जातो. ज्याअर्थी साडेआठ हजार वर्षांपूर्वी शेंडीवाला ब्राह्मण तुर्कस्थानात माहीत होता तर ब्राह्मण निर्गमित वैदिक संस्कृती त्याकाळी असणारच. सिंधु संस्कृतीचा काळ साडेतीन हजार वर्षांपूर्वीच्या मागे जात नाही. मग कोणती संस्कृती आधीची? असो, प्रगत विज्ञान आणि अभ्यास यातून इतिहासातील सत्य अधोरेखित होईलच.

 

या वस्तूंमध्ये तुळतुळीत गोटा व मागे रुळणारी शेंडी असा एक दगडी पुतळा सापडला आहे. (त्याचा फोटो गुगलवर नेवाली कोरी आर्टेफॅक्ट्स सर्चखाली चित्रसंग्रहात पाहता येईल.) आता याचे वर्णन करताना संशोधकांनी 'तत्कालीन रहिवाशांना डोक्यावर साप गुंडाळून सुशोभित करण्याची सवय असावी' असा तर्क मांडला, पण हे ब्राह्मणाचे शिखासहित मस्तकाचे शिल्प आहे, हे भारतीय संस्कृतीचा कुणीही माहीतगार बघताक्षणी सांगू शकतो.

योगप्रभूंच्या प्रतिसादाचा आणि त्यातून दिसणाऱ्या त्यांच्या वाचनाचा, व्यासंगाचा आवाका बघितला आणि थक्क झालो. अबब! केवढी ही विलक्षण विचक्षणा! सुतावरून स्वर्ग गाठणे माहीत होते. त्याच धरतीवर शेंडीवरून ब्राह्मण गाठणे म्हणजे केवळ अद्भुत.

"तुझं वाचन किती? तू बोलतोयस किती?"
"तुझा पगार किती? तू बोलतोयस किती?"

आता याचे वर्णन करताना संशोधकांनी 'तत्कालीन रहिवाशांना डोक्यावर साप गुंडाळून सुशोभित करण्याची सवय असावी' असा तर्क मांडला, पण हे ब्राह्मणाचे शिखासहित मस्तकाचे शिल्प आहे, हे भारतीय संस्कृतीचा कुणीही माहीतगार बघताक्षणी सांगू शकतो.

ज्याप्रमाणे मस्तकावर साप गुंडाळलेला असणे या अनुमानाला येणे हास्यास्पद आहे त्याचप्रमाणे एखाद-दुसर्‍या शिल्पावरून तो ब्राह्मणच असून तुर्कस्तानात भारतीय संस्कृती पोहोचलेली होती असे म्हणणेही तितकेच हास्यास्पद आहे.

साडे आठहजार वर्षांपूर्वीच्या नेवाली कोरीचे उदाहरण देताना नेवाली कोरीबद्दल आपल्याला इतर कोणत्या गोष्टी माहित आहेत हे ही बघायला हवे. याचबरोबर ते कोणती चिन्हे वापरीत, ती इतर ठिकाणी कोरलेली दिसतात का हे तपासायला हवे. अश्मयुगातील या संस्कृतीत कोणते लोक राहत होते, त्यांच्या धारणा, व्यापार, प्रवासाची साधने, त्यांचे देव, त्यांची संस्कृती याविषयी पुरेशी माहिती नसताना एकदम ब्राह्मण तेथे पोहोचले होते असे म्हणणे हे पटण्याचा प्रश्नच येत नाही.

योगप्रभू त्यांच्या प्रतिसादात सुरुवातीला म्हणतात -

संस्कृतीचा /प्राचीन कालखंडाचा वेध घेताना इतिहास, भूगोल, पर्यावरण शास्त्र, धर्मशास्त्र, पुरातत्वशास्त्र, मानववंश शास्त्र, भूगर्भशास्त्र, खगोलशास्त्र, भाषाशास्त्र, नाणकशास्त्र अशा अनेक शाखांनी वेध घ्यावा लागतो.

हे पटण्यासारखे आहे. पण ते प्रतिसादाचा शेवट बेधडकपणे

ज्याअर्थी साडेआठ हजार वर्षांपूर्वी शेंडीवाला ब्राह्मण तुर्कस्थानात माहीत होता तर ब्राह्मण निर्गमित वैदिक संस्कृती त्याकाळी असणारच.

करतात ते अजिबात पटणारे नाही. प्रतिसादाची सुरुवात आणि शेवट यांत प्रचंड तफावत आहे.

 

७९ पुस्तकांचे सुप्रसिद्ध लेखक आणि इतिहासाची जबरदस्त माहिती असणारे श्री. संजय सोनावणी यांच्या ब्लॉगवर एक नवा लेख मिळाला. त्यात ते लिहितात की संघ व त्याच्या अनेक शाखा-उपशाखा स्वत:ला हिंदु धर्मीयांचे तारणहार समजतात. तत्वद्न्य आणि समर्थक समजतात. त्यासाठी असंख्य धादांत खोट्या गोष्टी रचुन सांगत असतात. (उदा. हडप्पा/लोथल येथे सापडलेल्या तंदुर भट्ट्यांचे अवशेष हे यद्न्यकुंडांचे अवशेष आहेत...तात्पर्य सिंधु संस्कृती ही वैदिकांनी घडवली. इति. एम. के ढवळीकर. पु. ना. ओक ते वर्तक असेच तारे तोडत असतात.)

हा लेख इथे वाचा. त्यांचे मत इथल्या प्रतिसादांतील मतापेक्षा वेगळे वाटते.

 

लोथलला यज्ञवेदी असण्याबद्दल अनेक तज्ज्ञांचे लेखन वाचले आहे, नेटावर शोध घेतल्यास सहज उल्लेख मिळतील आणि माझ्याही मते त्या तशा असाव्यात. मला फोटो पाहिल्याचेही आठवते. आता त्या यज्ञवेदी आहेत की तंदूर भट्ट्या आहेत या विषयी मी अनभिज्ञ आहे.

परंतु येथे एक लक्षात घेणे आवश्यक आहे की लोथल हे हडप्पानंतरचे शहर आहे. कदाचित हडप्पामधील रहिवाशांनी स्थलांतर करून लोथलमध्ये वस्ती केली असावी असे काही तज्ज्ञांचे मत पडते. कसेही असले तरी लोथलच्या उन्नतीचा काळ हा सिंधू संस्कृती परिपक्व झाल्यावरचा आहे. लोथलची वस्ती संपणे आणि वैदिक संस्कृती बहरात येणे हे काळ जवळ-जवळ आहेत यामुळे वैदिक संस्कृतीच्या ज्या खुणा हडप्पाला दिसत नाहीत त्या लोथलला दिसणे शक्य आहे किंवा वैदिक संस्कृतीची पूर्वावशक्यता लोथलमध्ये पूर्ण होत असल्याचे पुरावे मिळू शकतील.

लोथलवासीयांना घोडा माहित होता असे मी मध्यंतरी वाचले आहे. मला हे नेमके खरे का माहित न्सले तरी यात काही खोटे आहे असेही वाटत नाही.

तंदूर भट्टी असेल तर लोथलचे रहिवाशी तंदूरी चिकन आणि नान खात होते का हे ही मला माहित नाही. ;-)

 लोथलचे माहिती नाही, पण गुजरातमध्येच सुरकोटडा येथे इसपू १७०० ह्या सुमारास घोड्याचे अवशेष सापडले आहेत. संदर्भ

 

लोथल, सुरकोटडा आणि इतर गुजराथेतील स्थळे ही सिंधू संस्कृती परिपक्व झाल्यावर (होऊन गेल्यावर) नावारुपाला आलेली आहेत. येथे एक महत्त्वाची गोष्ट लक्षात घ्यायला हवी ती अशी की ही शहरे बंदरे आहेत आणि येथून जलवाहतूक चालत असे. मेहरगढ आणि तिथून पुढे निपजलेली सिंधू संस्कृती ही वैदिक संस्कृती नावारुपाला येण्यापूर्वीच मध्य आशियातून स्थलांतरित झाली असावी. मधील काही हजार वर्षे तरी दोन्ही संस्कृतींचा फारसा संबंध उरला नसावा. त्यामुळे कोण कोणाचे संच-उपसंच होते हा फक्त मला पावर-गेम वाटतो.

घोड्याला जेव्हा पाळीव प्राण्याचे महत्त्व आले तेव्हा सिंधू आणि मध्य आशियातील संस्कृती यांचा संबंध उरला नसल्याने हडप्पा आणि मोहेंजेदारो आणि इतर समकालीन शहरांना घोडा माहित नाही. परंतु अशी शक्यता मला वाटते की पुढे जलवाहतूकी मार्गे घोडे जहाजांतून गुजराथेत आले असावे. अर्थातच, याचा अर्थ असा होत नाही की आल्याआल्या लोकांनी घोड्याला पाळीव प्राणी बनवले. कदाचित ते घोडे फक्त परदेशी व्यक्तींकडे असावे. कालांतराने ते एतद्देशीयांनी स्वीकारले. त्यानंतर काही काळाने त्यांची स्वतःहून पैदास सुरु केली वगैरे. म्हणून मी एवढेच म्हणते की लोथल किंवा इतर समकालीन स्थळांना घोडा माहित असावा. घोड्याचा राजरोस वापर होत होता असे चटकन म्हणता येत नाही/ मला त्याबद्दल ठोस विधान करता येत नाही.

येथे एक अवांतर उदाहरण द्यावेसे वाटते. अमेरिकेतील नेटिव इंडियन म्हटले की डोक्याला पिसे बिसे लावून, हातात भाले आणि धनुष्य बाण घेऊन, तोंडाने चित्रविचित्र आवाज काढत घोड्यावर दौडत येणारी जमात असे चित्र हॉलिवूडपटांनी समोर ठेवले आहे. प्रत्यक्षात घोडा हा प्राणी स्पॅनिश आणि पोर्तुगीज कॉन्विकीस्टॅडॉरनी जहाजावरून अमेरिकेत नेण्यापूर्वी अमेरिका खंडाला माहितही नव्हता पण लवकरच तो एतद्देशीयांनी आपलासा करून घेतला. याला काही शे वर्षे लागली. हजारो वर्षे नाही. तसेच काही भारतातही घडले असण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे आधी सिंधू संस्कृतीला घोडा माहित नव्हता हे विधान योग्य आहे. सिंधू संस्कृतीच्या उतरत्या काळात घोडा भारतीय उपखंडात येऊन पोहोचला होता ही शक्यताही योग्य वाटते.

 रेड् इंडियनचे उदाहरण समर्पक आहे :) बाकी सुरकोटडाचे उदाहरण हे औट्लायर आहे, त्यावरून इतर निष्कर्ष काढता येणार नाहीत हे मात्र नक्की. तो एक अवशेष सोडला तर मग घोड्याचा सर्वांत जुना अवशेष हा स्वात खोर्‍यात आढळला आहे. पण या निमित्ताने अजून एक प्रश्न असा आहे, की निव्वळ एका घोड्याच्या मुद्द्यावरून वैदिक-अवैदिक असे निष्कर्ष काढणे कितपत बरोबर आहे? कारण ऋग्वेदात एके ठिकाणी उल्लेख आहे की त्यांचे शत्रू जे दस्यू यांनी घोड्यांवरचा कर भरला आहे. (७व्या मंडलातले १८ वे सूक्त, त्यातली १९वी ऋचा) त्यामुळे घोडा=वैदिक ही मोनॉपॉली चूक ठरते. पण मग घोडा नसेल तरचा सिनॅरिओ काय् आहे हेदेखील पहायला हवे. अश्वमेधातला घोडा हा ३४ बरगडीवाला तर इक्वस् कॅबॅलस् हा ३६ बरगडीवाला असेही वाचले आहे. मग जर वैदिक आर्यांचा घोडा एक्वस् फेरस् कॅबॅलस् असेल तर त्याचा काळ हा इसपू २००० च्या आधीदेखील जाऊ शकतो. 

निव्वळ एका घोड्याच्या मुद्द्यावरून वैदिक-अवैदिक असे निष्कर्ष काढणे कितपत बरोबर आहे?

तसे नव्हे. वैदिक-अवैदिक वादात घोड्याचा मुद्दा महत्त्वपूर्ण मानला जातो असे काहीसे असावे.

घोड्याला इतके महत्त्व देण्याचे मूळ कारण असे आहे की मागास आर्य घोड्यावर बसून आले आणि त्यांनी सिंधू संस्कृतीतील लोकांवर आक्रमण केले या एका गृहितकाने घोडा सिंधू संस्कृतीत महत्त्वपूर्ण ठरतो. खरेतर जगाच्या पाठीवर अशा अनेक वस्ती आहेत की जेथे घोडा नव्हता. तरीही त्या एकमेकांशी लढत होत्या, व्यापार करत होत्या आणि वाहतूक करत होत्या. वशिंडांचे प्राणी (झेबू) हे सिंधू संस्कृतीतील प्रमुख पशु. त्यामुळे घोड्यावाचून सिंधू संस्कृतीचे काही अडले नसावे.

घोड्यासदृश एखादा प्राणी या संस्कृतीत असावा का? असू शकेल परंतु त्यावर बसून युद्ध केल्याचे वगैरे दाखले मिळत नाहीत. तसा काही शिक्क्यांवर दिसणारा एकशिंगी प्राणी (युनिकॉर्न) दिसतो तो कोणता याची देखील कल्पना नाही.

परंतु ऋग्वेद काळापर्यंत घोडा भारतीय उपखंडात रुजला असावा असे वाटते.

 >परंतु ऋग्वेद काळापर्यंत घोडा भारतीय उपखंडात रुजला असावा असे वाटते.

सहमत. अजूनपर्यंत तरी सुरकोटडामधील अवशेषापेक्षा जुना घोड्याचा अवशेष भारतीय उपखंडात नाही आढळला. कझाखस्तान येथे माणसाळवलेल्या घोड्याचे सर्वांत जुने अवशेष सापडतात. गनेरीवालासारखी (तिथे ganeriwala असे सर्च् करावे, कारण लेखाचा विषय वेगळा आहे) प्रचंड मोठी ठिकाणे अजूनपर्यंत अनुत्खनित आहेत. काय माहिती, अजून घोड्याचे अवशेष सापडतीलही. तोपर्यंत मात्र घोडा आणि वैदिकांचे उत्तरसिंधू काळातील साहचर्य मान्य करावे लागेलच. 

 मागास आर्य घोड्यावर बसून आले आणि त्यांनी सिंधू संस्कृतीतील लोकांवर आक्रमण केले

घोड्यांचे रथ कॉमन असले तरी घोड्यावर बसण्याची कला बरीच नंतर (इसवीसनानंतर?) अवगत झाली असे वाचल्याचे स्मरते.

 

घोडेस्वारी नेमकी कधी सुरू झाली हे माहित नाही पण घोड्यांचा उपयोग बैलांसारखाच वाहतूकीसाठी आधी निर्माण झाला असावा. त्यामुळे घोडेस्वारी ही नंतरची म्हटले तर योग्य ठरावे. महाभारतातही घोडेस्वार होते का याची कल्पना नाही. रथांविषयी नक्की लिहिलेले आहे. परंतु घोडेस्वारी इसवी सनानंतरची नक्कीच नाही. थोडासा शोध घेता असीरियन घोडेस्वारांची शिल्पे इ.स.पूर्व ८०० वगैरेमधील आहेत असे दिसले. अर्थातच खोगीर, रिकिब वगैरे प्रकार त्यामानाने खूपच अर्वाचीन आहेत त्यामुळेच घोड्याच्या पाठीवर बसून युद्ध वगैरे करणे कठीण होते आणि "घोड्यावर बसून आले आणि युद्ध केलेचे.."चे गृहितक चुकीचे ठरते परंतु वाहतूकीच्या निमित्ताने घोड्यावर बसून आले नसावेत असे म्हणता येत नाही. (अर्थातच ही गृहितके आहेत.)

परंतु घोडेस्वारी इसवी सनानंतरची नक्कीच नाही. अलेक्झांडर आणि त्याचा भारतावरील स्वारीत मेलेला ब्युसाफेलस हा लाडका घोडा आठवतो का? :-)

माझा मागचा एक लेख चाळला -

पुत्राच्या मृत्यूची बातमी आणि दोन्ही बाजूंनी सरकणारे अलेक्झांडरचे सैन्य पाहून नेमकी कोणती युद्धनिती वापरावी हे पुरुला कळेना. शेवटी त्याने अलेक्झांडरच्या रोखाने सैन्य वळवण्याचे आदेश दिले. वळवलेल्या सैन्यात ३०, ००० चे पायदळ, ४००० चे घोडदळ, सुमारे ३०० रथ आणि २०० हत्ती होते.

यानुसार इ.स.पूर्व ३२६मध्ये भारतीय उपखंडात घोड्याच्या पाठीवरून लढाई होत होती. (संदर्भः अलेक्झांडर-पुरु युद्ध)

अबब! ४००० चे घोडदळ? हा आकडा मला नेहमीच मोठा वाटत आला आहे परंतु एरियनवर विश्वास ठेवणे (आणि एरियनला टोलेमीवर विश्वास ठेवणे) भाग आहे. :-(

 

>>अबब! ४००० चे घोडदळ? हा आकडा मला नेहमीच मोठा वाटत आला आहे परंतु एरियनवर विश्वास ठेवणे (आणि एरियनला टोलेमीवर विश्वास ठेवणे) भाग आहे. :-(

हा आकडा का मोठा वाटावा? पुरु हा पंजाब भागातला राजा होता. उत्तम घोडे त्याला बर्‍याच मोठ्या संख्येने उपलब्ध असणे सहज शक्य आहे त्याच्या विशिष्ट भौगोलिक ठिकाणामुळे.

पुरु हा पंजाब भागातला राजा होता. उत्तम घोडे त्याला बर्‍याच मोठ्या संख्येने उपलब्ध असणे सहज शक्य आहे त्याच्या विशिष्ट भौगोलिक ठिकाणामुळे

पुरु हा किती मोठा राजा होता याची नेमकी माहिती नाही. तो फक्त पूर्व पंजाबातील राजा होता पण व्यवस्थित राज्य राखणारा राजा असावा. अर्थात, पुरुच्या सोबत आजूबाजूचे इतर लहान राजेही लढले असावे पण नेमकी कल्पना नाही. पंजाब क्षेत्र सुपीक असले तरी ४००० हा आकडा का कोणास ठाऊक मला मोठाच वाटतो. या उलट, कलिंगचे राज्य चांगले मोठे होते असे वाटते परंतु मेगॅस्थेनिस आणि प्लीनी द एल्डर यांच्यामते तेथे फक्त १००० चे घोडदळ होते. अर्थातच, यातून काही सिद्ध होत नाही. सैन्यरचना, व्यूहरचना आणि इतर अनेक गोष्टींवरून घोडदळाचा आकार ठरत असावा. मला आपली उगीच शंका आहे.

पहिले वाक्य कलिंगचे राज्य चांगले मोठे होते असे वाटते
परंतु मेगॅस्थेनिस आणि प्लीनी द एल्डर यांच्यामते तेथे फक्त १००० चे घोडदळ होते.
हे काय विरोधी नाय.

कलिंगची खरी मदार हत्तीदलावर होती. त्याकाळातल्या सर्वात मोठ्या हत्तीदळापैकी एक त्यांच्याकडे होते म्हणून त्यांचा दबदबा होता असे ऐकले आहे.
घोडदळ लहान असले तरी ते हत्तीने कॉम्पनसेट करत असावेत.

४००० घोडे म्हणतात तेव्हा त्यातले सर्वच काही उत्तम प्रजातीचे अरबी घोडे किंवा उंच असे ब्रिटिश घोडे असतील असे नव्हे. ते त्या काळात त्याच्या पप्पाला तरी कसे परवडले असते?
प्रामुख्याने स्थानिक प्रजातीची घोडी, मुद्दाम अधिक सांभाळलेली, सातत्याने पागेत पैदास केलेली असावीत. हे जर असेल तरीही ४००० हा आकडा मोठा वाटतो का?

 

४००० घोडे म्हणतात तेव्हा त्यातले सर्वच काही उत्तम प्रजातीचे अरबी घोडे किंवा उंच असे ब्रिटिश घोडे असतील असे नव्हे. ते त्या काळात त्याच्या पप्पाला तरी कसे परवडले असते?

हाहाहा! अहो पप्पा, ४००० असोत की १००० त्यांच्या पोटापाण्याचा आणि घोडेस्वाराच्या पोटापाण्याचा प्रश्न आहेच की नाही. मगध सम्राटाकडे ३००००चे घोडदळ होते आणि बाकीचे सैन्य. त्यांना रोजच्यारोज पगार मिळत असे म्हणे पण ते पडले सम्राट. असो.

आकडा खोटा असेल असे नाही. पुरुला युद्धासाठी स्थानिक राजांनी मदत केली असेल. अलेक्झांडरच्या सैन्याला तोंड द्यायला तो ५०० घोडे घेऊन गेला नसेलच. किंवा युद्धात आकडे वाढवून चढवून सांगण्याची पद्धत आहे. असे अनेक युद्धांत दिसते. दोहोंपैकी एक खरे. असो. हा काही वादाचा मुद्दा नाही. माझ्या नसत्या शंका इतकेच.
मी ४००० चे घोडदळ मान्य केले आहे.
बाकी,

कलिंगची मदार हत्तींवर होती हे खरेच. त्यांच्याकडे १००० घोडे आणि ७०० हत्ती. कलिंगवासी हत्तीला नांगर लावून शेत नांगरत असेही सांगितले जाते.


(हे ब्रिटिश आणि अरबी कुठे आले मध्येच. ह. घ्या. ;-) )

 

इ.स.पूर्व ८००० ते ९००० च्या दरम्यान जगात कोणताही धर्म आणि संस्कृती नांदत नव्हती. मनुष्य शिकार गोळा करण्याच्या अवस्थेतून बाहेर येऊन हळूहळू शेती करू लागला होता. शेतीचं महत्त्व त्याच्या ध्यानात येत होतं.

माणसाने शिकार कमी करून शेतीकडे लक्ष वळवल्यावर, शेतीचे पूर्ण फायदे लक्षात येण्यास आणि शिकार्‍यापासून शेतकर्‍यापर्यंत त्याचा प्रवास होण्यास शेकडो आणि हजारो वर्षांचा कालावधी गेला आहे. हे लक्षात घ्यायला हवे की हा अश्मयुगाचा काळ आहे. माणसाकडे धातूची शस्त्रे नाहीत, नव्हती. ती तशी नेवाली कोरीलाही आढळत नाहीत. या काळात धर्म, संस्कृती इ. सोडाच पण शेतीशिवाय इतर उद्योगही करायचेही माणसाला माहित नव्हते. इ.स.पूर्व ८-९००० वर्षांपूर्वी माणूस हळू हळू गावे बांधून राहायला लागला होता. जे काही धर्म म्हणून तो पाळत होता तो "शॅमॅनिजम" (याला मराठी शब्द माहित नाही.) प्रकारचा होता. माणसाला समाज आणि समाजरचनेची जाणीव हळूहळू होऊ लागली होती.

नेवाली कोरी आणि गोबेक्ली टेपी वगैरे प्रदेशांतील उत्खनन नक्कीच महत्त्वपूर्ण आहे कारण आतापर्यंत इतकी जुनी साइट न सापडल्याने इ.स.पूर्व ९००० वर्षांपूर्वी मानवी प्रगती कितपत होती ते माहित नव्हते. विशेषतः शेतीला सुरुवात झाल्यावर माणूस घरे, प्रार्थनास्थळे बांधू लागला आणि एका जागी स्थिरावला असे मानले जाते परंतु गोबेक्ली टेपीमुळे लक्षात आले की शिकारसंचय (हंटरगॅदरिंग) करणार्‍या जमातीसुद्धा एका जागी स्थिरावत होत्या आणि गावे बांधून राहत होत्या. पण अर्थातच, हे लक्षात घ्यायला हवे की वायव्य आशियामध्येच प्रथमतः शेतीला सुरुवात झाली आणि माणसाने वस्ती करण्यास सुरुवात केली. दुसर्‍या शब्दांत, या काळात वायव्य आशिया सोडून इतरत्र शेतीभाती - पशुपालन होत नव्हते.

इथे वर सांगितलेला मुद्दा असा की गोबेक्ली टेपीमधील लोक शेतकरी नव्हते. त्यांना शेती आणि पशुपालन यांची माहिती नव्हती पण त्यानंतर १००० वर्षांनी तयार झालेल्या स्थळांवर शेती आणि पशुपालनाचे पुरावे मिळतात. याचाच अर्थ हा काळ, वायव्य आशियातच ट्रांझिशनचा होता. इतरत्र शेती-भाती, धर्म, संस्कृती यांना सुरुवात झाली नव्हती. इजिप्त आणि भारतीय उपखंड या दोन्ही ठिकाणी वायव्य आशियातील पिके काढावयास सुरुवात होऊन शेतीला सुरुवात झाली आहे आणि तिचा काळ इ.स.पूर्व ५००० व पुढे असावा. त्यामुळे अस्तित्वात नसलेल्या हिंदू संस्कृतीतील कोणी ब्राह्मण तेथे पोहोचला ही कल्पनेची भरारी म्हणून उत्तम आहे.

 
 
ऐतिहासिक ‘महाराष्ट्र’
 १ मे ,१९६० रोजी भाषेच्या आधारावर स्वतंत्र महाराष्ट्र राज्याची निर्मिती झाली. त्यासाठी झालेला लढा आपल्याला माहित आहेच. परंतु महाराष्ट्र राज्याचा इतिहास किती मागे जातो,याचा विचार करायचा म्हटले तर सर्वसाधारणपणे आपल्या समोर शिवाजी महाराज, पेशवे हे सगळं डोळ्यासमोर उभे राहाते. त्या आधी इथे होऊन गेलेल्या साम्राज्यांची तितकीशी ओळख नसते. तेच मांडण्याचा हा एक प्रयत्न…

‘महाराष्ट्र’ या नावाने प्रसिद्ध असलेले आपले राज्य खूप प्राचीन काळापासून या नावाने ओळखले जाते. अर्थात त्यावेळी त्याचा भौगोलिक विस्तार किती होता याविषयी विविध मते आहेत. प्राचीन काळात रट्ठ नावाची एक जमात येथे राहत होती. त्यांच्या पराक्रमामुळे ते ‘महारट्ठ’ (महान रट्ठ) म्हणून ओळखले जाऊ लागले. पुढे या शब्दाचा अपभ्रंश होत होत ‘महाराष्ट्र’ नाव झाले असावे अशी एक समजुत आहे. तसेच ‘महाराष्ट्र’ हा उल्लेख इतिहासात इसवी सन दुसऱ्या शतकापासून मिळाला आहे,असेही मानण्यात येते. इसवी सन सातव्या शतकात भारतभेटीवर आलेल्या ह्युआन श्र्वांग या चिनी मुसाफिराच्या पुस्तकात महाराष्ट्राचा संदर्भ आला आहे.हे झाले ‘महाराष्ट्र’ या नावाबद्दल.पण अश्म युग,ताम्रपाषाण युग इतक्या प्रागैतिहासिक काळात महाराष्ट्राचे अस्तित्व असल्याचे पुरातन संशोधनातून समोर आले आहे. संशोधकांना महाराष्ट्रात अनेक पुरातन जागा मिळाल्या आहेत.
महाराष्ट्र हा ‘कणखर देशा, दगडांच्या देशा’ असाच ओळखला जातो. महाराष्ट्राच्या भूतकाळातील पहिले पान म्हणजे अश्मयुग (पाषाणयुग).अश्मयुग या नावातच त्याचा अर्थ दडलेला आहे. अश्मयुग (stone age) म्हणजेच मानवाच्याविकासाचा प्रथमाध्याय होय ! या काळातील माणूस भटक्या अवस्थेत होता. नदी हीच त्याची जीवनदायिनी. नदीकाठी वास्तव्य करुन आपल्या आजुबाजुला उपलब्ध असलेल्या दगडांपासून तो हत्यारे तयार करीत असे. महाराष्ट्रातील बोरी येथे काही अश्मयुगीन हत्यारे टेफ्रा (ज्वालामुखीची राख) वर मिळाली होती. वैज्ञानिक तपासानुसार ही राख १.४ दशलक्ष वर्षांपूर्वीची असल्याने तिथे सापडलेल्या या वस्तू अश्मयुगीन काळातील असल्याचे सिद्ध झाले. त्यानंतर तांबे या धातुचा शोध लागला. या कालावधीला पुरातत्त्व शास्त्रज्ञ ताम्रपाषाणयुग असे संबोधतात. महाराष्ट्रातील दायमाबाद, सावळदा, इनामगाव व अश्या अनेक ठिकाणी उत्खननात तांबे व त्याबरोबरच त्या काळात वापरली जाणारी मातीची खापरे आणि इतर काही वस्तू व वास्तु संशोधकांना मिळाल्या. याचबरोबरीने शेतीसंस्कृतीचा उदय ही महाराष्ट्रात झाला होता. मुळातच अनेक नद्यांमुळे ही भूमी सुपीक आहे. त्यामुळे इथल्या नद्यांच्या प्रदेशात हा माणूस शेतीसाठी स्थिरावला.पुढे ‘लोखंड’ या धातूशी मानवाची ओळख झाली. साधारणतः हा काळ इ.स. पूर्व १२०० पासून सुरु झाला असं म्हणतात. ‘लोह’ हा माणसाच्या आयुष्यातला एक अतिशय महत्त्वाचा असा शोध ठरला. महाराष्ट्रातील विदर्भ भागात जमीनी खाली लोखंडाची काही हत्यारे, व इतर वस्तू संशोधकांना सापडल्या. त्याच बरोबर नायकुंड ह्या नागपुर जवळ असलेल्या गावात लोखंडाची काही हत्यारे व चिकणमातीपासून बनवलेली लोह भट्टी मिळाली.त्याचबरोबर संशोधकांना ‘megalithic burial ‘ (प्राचीन काळी काही जमातींमध्ये माणूस मृत्यू पावल्यावर त्याला ज्या जागी पुरले जायचे तेथे मोठे मोठेदगड रचून ठेवले जायचे) चे काही अवशेष ही मिळाले. त्याच प्रमाणे माहुर्झरी, जूनापाणी,इत्यादी ठिकाणी बरेच महत्त्वाचे शोध लागले.


हिरापूर येथील Megalithic Burial
यानंतर उदयास आला तो ऐतिहासिक काळ. या काळात लिखाण अस्तित्त्वात आले. विविध साहित्य लिहिले गेले.त्यामुळे या काळाला पुरातत्त्व संशोधनात वेगळे महत्त्व आहे. हा काळ म्हणजेच बुद्ध आणि महावीर यांचा काळ. इसवी सन पूर्व ६०० पासून या काळाची सुरुवात झाली असावी असे मानण्यात येते. याच काळात विविध साम्राज्य अस्तित्वात आली.ज्यावेळी भारतभर विविध प्रदेशात अनेक राजे राज्य करत होते त्यावेळी महाराष्ट्रात सुद्धा शक्तिशाली साम्राज्ये निर्माण झाली. व्यापारी केंद्राचे मुख्य ठिकाण ‘शुर्पारक’ (आताचे नालासोपारा), येथे इ. स. पुर्व ३ ऱ्या शतकात सम्राट अशोकाने धर्मप्रचारासाठी मौर्य ब्राम्ही लिपीत लिहिलेला शिलालेख प्रसिद्ध आहे. या ऐतिहासिक काळात अनेक राजवटींनी या प्रदेशावर आपली सत्ता गाजवली. इसवी सन पूर्व दुसरे शतक ते इसवी सन पहिले यामध्ये सातवाहन साम्राज्य महाराष्ट्रात प्रबळ होते. प्रतिष्ठान (आताचे पैठण) हे त्यांचे राजधानीचे ठिकाण होते. या कालखंडात कार्ले, भाजे, कान्हेरी, बेडसे या सगळ्यात प्राचीन समजल्या जाणाऱ्या बौद्ध गुंफा कोरल्या गेल्या.याच साम्राज्यातील राजा श्री सातकर्णी ह्याची राणी नागणिका हिने अखंड भींतीवर कोरलेला शिलालेख हा एक महत्वाचा ऐतिहासिक दुवा संशोधकांना नाणेघाट येथे सापडला आहे. त्यावरून त्या काळातील सातवाहन राजे, देव ,व्रते ,दानधर्म आणि समाजातील धार्मिक बाबींचा उलगडा झाला. याच लेणीत एक प्रतिमागृह असल्याचे ही कळते व त्या भग्न प्रतिमांखाली राजांची नावे देखील कोरलेली आहेत. गौतमीपुत्र सातकर्णी हा या घराण्यातील महान राजा होऊन गेला. एका शिलालेखात ‘त्रि समुद्र तोय पित वाहना’ ( ज्याचा घोडा तीन समुद्राचे पाणी प्यायला आहे ) असा उल्लेख या राजाबद्दल केला आहे.या वरूनच सातवाहनांचा प्रभाव दिसून येतो.


नागाणिका राणीचा भिंतीवरील शिलालेख

बेडसे चैत्यगृह
इसवी सन २५० – ५०५ दरम्यान वाकाटक राजवटीने राज्य केले. विदर्भातील नगरधन ( पूर्वीचे नंदीवर्धन) ही यांची राजधानी असल्याचे पुरावे सांगतात आणि येथे मोठ्या प्रमाणात उत्खनन ही झाले. मन्सर, रामटेक, वाशीम, पौनार, मांढळ, कौदिन्यपूर ही या राजवटीची काही महत्वाची स्थाने होती.त्याचवेळी उत्तरेस गुप्त घराणे हे सुद्धा प्रभावशाली होते.राजा चंद्रगुप्त दुसरा, याची कन्या प्रभावतीगुप्त ही वाकाटक घराण्याची सून झाली आणि ह्या दोन राजवटींचे एकमेकांशी संबंध जोडले गेले. या संबंधातून गुप्त घराण्याच्या धार्मिक विचारांचा वाकाटकांवर पगडा दिसून आला. राणी प्रभावती हिच्या शिलालेखांतून हे दिसून येते. शिवभक्त असणाऱ्या वाकाटकांनी पुढील काळात नरसिंह,वराह यांची मंदिरे बांधली.
स्थापत्यकलेच्या जडणघडणीत हा एक महत्वाचा काळ मानण्यात येतो. वाकाटक घराण्यातील हरिशेन राजा याच्या काळात अजिंठा लेणीचे काम जोमाने सुरु झाले.अनेक प्राचीन हिंदू मंदिराचे बांधकाम या काळातील असल्याचे दिसून येते.

याशिवाय अनेक महत्वाच्या राजघराण्यांचा महाराष्ट्राच्या जडणघडणीत वाटा होता. चालुक्य, राष्ट्रकूट,कलचुरी,शिलाहार, यादव यांचा समृद्ध काळ महाराष्ट्राने अनुभवला. घारापुरी (एलिफंटा)लेणी, अंबरनाथ शिवालय, कोपेश्वर, देवगिरी अशी अनेक स्थाने या समृद्धीची प्रतीके म्हणून ओळखली जातात.याशिवाय महाराष्ट्र प्रदेशाबाहेरील मौर्य ,गुप्त, मुघल राजवटीसारख्या अनेक राजवटींचा प्रभावही इथे दिसून आला.त्यानंतर मग आपल्या सर्वांच्या परिचयाचा असा मराठे आणि पेशवे यांचा काळ सुरु झाला.
एकूणच महाराष्ट्राचा ऐतिहासिक कालखंड विविधप्रकारे भारत आणि जगाच्या इतिहासाचा अभ्यास करताना मोलाची भूमिका बजावतो.


वेरुळ येथील कैलाश मंदिराचे शिखर
माहिती संकलन आणि सर्व छायाचित्रे : ऐश्वर्या देवस्थळी
शब्दांकन : स्वाती भट

 
 
प्राचीन भारतातील राजे आणि वंश
 आताच नासदिय सूक्ताबद्दल लिहिताना त्यातील एक पंक्ती आठवली. 'सृष्टी निर्माण झाल्यावरच देव उदय पावले (निर्माण झाले)' अशा आशयाची. त्यावरून काही काळापूर्वी तयार केलेला हा चार्ट आठवला.

आपल्या पुराणांत आणि महाकाव्यांत येणार्‍या नायकांची/ राजांची अनेकदा वंशावळ दिलेली आढळते. ही वंशावळ कुठून कोठपर्यंत मिळू शकते असा विचार केला असता बराच मोठा काळ पुराणांत नमूद केल्याचे दिसते. प्राचीन भारतातील पहिला सम्राट म्हणून बरेचदा प्राचीनबर्ही किंवा दक्षप्रजापतीचे नाव घेतले जाते, परंतु सृष्टीचा निर्माता ब्रह्मदेव* असल्याचे सांगितले जाते.

प.वि.वर्तक यांच्या वास्तव रामायणाच्या अनुषंगाने असाच एक चार्ट मी फार पूर्वी बनवला होता परंतु त्याची सुरुवात कश्यप** ऋषींपासून सुरु होऊन महाभारतातील जनमेजयापर्यंत पोहोचत होती. तत्पूर्वी कोणते राजे झाले हे खालील चित्रात दाखवले आहे. मध्यंतरी मला कोणीतरी प्रश्न विचारला होता की ध्रुवबाळाची गोष्ट केवळ आख्यायिका आहे की सत्य? आणि सत्य असल्यास तो कोणत्या वंशातील राजा होता. त्याचे उत्तर खालील चित्रात मिळेलच.
kings

चित्राचा पसारा मोठा असल्याने न्याहळाकाच्या चौकटीत ते दिसणे थोडे कठिण होईल. संगणकावर उतरवून घेतल्यास व्यवस्थित पाहता येईल.

* ब्रह्मदेवाला प्रिया नावाची कन्या आणि नारद(मुनी) हे मानसपुत्रही होते.

** दक्ष प्रजापतीच्या १३ मुलींची लग्ने कश्यप ऋषींशी झाली होती, तो आणि पुढील चार्ट पुन्हा कधीतरी.

या अनुषंगाने होणारी चर्चा अपेक्षित आहे. चित्र किंवा माहिती परिपूर्ण असल्याचा दावा नाही. सुचवण्यांच्या प्रतीक्षेत.

संदर्भ : ब्रह्मपुराण आणि श्री मद्भागवत.

 

दक्षाला नक्की मुली किती होत्या?

पार्वती सोडली तर बाकीच्यांनी चंद्राला वर म्हणून पसंती दिल्याचे वाचले होते.

पार्वतीने अंगाला भस्म फासणार्‍या, व्याघ्रजीन नेसणार्‍या शंकराला वरले म्हणून तीला हसल्या होत्या. 

अनेक असाव्यात आणि त्या अर्थातच एकाच राणीपासून झालेल्या नसाव्यात. ;-)

पण पार्वती दक्षाची मुलगी नाही. दक्षाची मुलगी सती. जिने शंकराला वरले आणि नंतर यज्ञात समर्पण केले. पार्वती ही हिमालयाची मुलगी आणि शंकराची द्वितिय पत्नी. (सोयीसाठी ;-) ??) ती सतीचा पुनर्जन्म असल्याचे सांगितले जाते. तरी, सती आणि पार्वती या दोन्ही शक्तीस्वरुप मानल्या जातात.

 
मला वाटते दक्षाची मुलगी सती हीचेच नाव उमा देखील होते. पुर्वीच्या मराठी गाण्यांवरून जायचे असेल आणि कविंच्या पौराणिक ज्ञानावर विश्वास ठेवायचा असेल तर खालील गाणि लक्षात घ्यावी लागतीलः

मानभंग हाची झाला मंडपी आहेर, उमा म्हणे यज्ञी माझे जळाले माहेर...

आणि

भस्म विलेपीत रूप साजीरे आणूनीया चिंतनी, अपर्णा तप कारीते काननी

सतीचे नाव उमा होते असे माझ्या वाचनात आलेले नाही, चू. भू. घे. दे. उमा नावाची शक्तीस्वरूप देवता वेदांत असल्याचे वाचले आहे. उमा, सती आणि पार्वती ही शक्तीची रुपे असल्याने त्यांचा घोळ कवी मंडळींनी व्यवस्थित घालून ठेवलेला आहे. ;-) मात्र, गौरी हे पार्वतीचे नाव.  

तपाने खंगलेली पार्वती अपर्णा, बाकीच्यांना हे नाव वापरलेले फाससे ऐकण्यात नाही.

पार्वतीने शिवाची प्राप्ती करून घेण्यासाठी उग्र तपसाधना केली.
त्यात एक पंचाग्निसाधन म्हणून प्रकारही होता, म्हणजे चारी बाजूंस अग्नी पेटवून वरून तळपते ऊन या सर्वांच्या मध्यभागी उभे राहून तप करणे.
तसेच अन्नाचा संपूर्ण त्याग, पानसुद्धा खायचे नाही असे केले म्हणून ती अपर्णा.
हे अघोरी तपाचरण पाहून कोणीतरी (बहुधा तिची आई) म्हणाले की बाळे, हे/असे (उ - भोजपुरी की काय?) करू नको (मा), म्हणून ती उमा.
"उमा म्हणे यज्ञी माझे जळाले माहेर" ही कवीची चूक असावी, उमेचे माहेर कधीच जळाले नाही.

उमा म्हणे यज्ञी माझे जळाले माहेर" हे गाणे (पं. महदेवशास्त्री जोशींच्या कादंबरीवर आधारीत) मानीनी चित्रपटातील आहे. त्याची पूर्वपिठीका ही माहेरच्यांकडून (प्रेम विवाह झालेल्या पण साधा असलेल्या) नवर्‍याचा अपमान झालेल्या बाईने म्हणलेले गाणे आहे. त्याचा संबंध सतीचा नवरा म्हणजे शंकर याचा अपमान झालेला पाहून सती जीवनाचा त्याग करते त्या प्रसंगाशी लावला आहे. माहेर जळाले असा शब्दशः अर्थ त्यात नाही आहे. पारंपारीक चाल आणि साध्या सोप्या शब्दातले हे गाणे आहे,

मानभंग हाचि झाला मंडपी आहेर
उमा म्हणे, यज्ञी माझे जळाले माहेर

माहेरीच्या सोहळ्यात, नाहि निमंत्रिले जामात
चहू दिशी चालू होते संपदेचे थेर

लक्ष्मीचे जमले दास, पुसे कोण वैराग्यास
लेक पोटीचीही झाली कोपऱ्यात केर

आई-बाप, बंधु-बहिणी, दारिद्र्यात नसते कोणी
दीन दानतीचे सारे धनाचे कुबेर

दक्षसुता जळली मेली, नवे रूप आता ल्याली
पित्याघरी झाला ऐसा, दिव्य पाहुणेर

परत सासुऱ्याशी जाता, तोंड कसे दावू नाथा
बोल ईश्वराचे झाले सत्य की अखेर

प्राणनाथ करिती वास, स्वर्गतुल्य तो कैलास
नाचतात सिद्धी तेथे, धरूनिया फेर

असो स्मशानी की रानी, पतीगृही पत्नी राणी
महावस्त्र तेथे होते सतीचे जुनेर 

विवस्वत(सूर्य) वंश
१.मनू यम यमी
२. इक्ष्वाकू
३.विकुक्षी
६.पृथू
३३. हरिश्चंद्र
४१. सगर
६२. रघू
६५. राम
९४. बृहद्बल

चंद्र वंश
२. इला भ्र. बुध
३. पुरुरवा
६. ययाति
७. पुरु
४३.भरत
५१. हस्तिन
७१. कुरू
९४. पांडव

ही वंशावळ इतरत्र पाहिली. (विस्ताराने नंतर.):)
माझ्या आत्तापर्य़ंतच्या माहितीनुसार मरीची, अंगीरस वगैरे सात ऋषी ब्रह्मदेवाचे मानसपुत्र होते.
वंशवृक्षावरून तसे वाटत नाही.
स्वायंभुव मनु हा शतरूपा या ब्रह्मदेवाच्या मानसकन्येचा नवरा. इथे तो मुलगा आहे अशा रीतीने दाखवला आहे.
सनत्कुमार हाही मानसपुत्र, पण रुद्र इथे कुठून आला? का माझ्या वाचनात काही चूक होते आहे?
उत्तानपाद राजाच्या भावाचे नाव प्रियव्रत होते असे वाचले होते, प्रियवर्त नाव अर्थहीन वाटते. दुसर्‍या भावाचे
नाव नीट वाचता आले नाही. ध्रुव आणि प्राचीनबर्ही यांच्या दरम्यान अनेक राजे होऊन गेले होते ते तुटक रेषेने
दाखवले हे योग्यच झाले; पण प्राचीनबर्हीच्या पित्याचे हविर्धान हे नाव द्यायला हरकत नव्हती.
प्रचेतस(या नावाच्या दहा मुलां )च्या आईचे नाव शतद्रु किंवा सवर्णा. त्यांच्या पत्‍नीचे नाव मारिषा. हे नाव
मारिशासारखे दिसते आहे. मारिष म्हणजे श्रेष्ठ किंवा तांदुळजा(एक पालेभाजी). मारिश किंवा मारिशा अर्थहीन.
नक्की काय लिहिले आहे ते वाचता आले नाही. लाल बाणाच्या पूर्वीचा मजकूर दहा मुलगे होते, ते राजकारभार सोडून
तप करायला गेले आ...असा काहीसा दिसतो आहे.

रुद्र हा ब्रह्मदेवाचाच मानसपुत्र असल्याचे वाचले आहे. ब्रह्मदेवाने मनुष्यजात वृद्धिंगत व्हावी म्हणून सप्त-ऋषींची निर्मिती केली. परंतु हे सर्व मानसपुत्र संसार आणि प्रपंचात मग्न होण्याऐवजी भक्तीत मग्न होते. यामुळे एकदा ब्रह्मदेव प्रचंड रागावले आणि त्यांच्या रागातून अर्धा पुरुष आणि अर्धी स्त्रीरुप असलेल्या रुद्राची निर्मिती झाली. रुद्रावर यापूर्वीही चर्चा झाली होतीच. त्यावरून तो शिवस्वरुप आहे हे नक्कीच. ब्रह्मपुराण आणि पद्मपुराण या दोहोंतही तसे संदर्भ सापडले.

दक्षाला अजूनही अनेक कन्या आहेत. त्यांचे सर्वांचे संदर्भ चित्रातून देणे अशक्य. मला महत्त्वाचे वाटणारे संदर्भ येथे दिले आहेत. इतरांना जर महत्त्वाचे वाटले तर मूळ चार्टमध्ये सुधारणा करता येईलच.

तसेच, शतरूपा आणि स्वयंभू मनु हे दोघेही ब्रह्माची निर्मिती (त्यांना बहिण-भाऊ मानता येत नाही.) ते एकमेकांना पूरक असावेत म्हणूनच ही निर्मिती केली गेली होती.

ही मारिषा कंडु नावाच्या ब्रह्मर्षीची कन्या. हिची आई प्रम्‍लोचा ही अप्सरा. (प्रियालींच्या 'अप्सरा'त उम्‍लोचा नाव असल्याचे आठवते, प्रम्‍लोचा नसावे, तसेच उर्वशी होते पण उर्वरा नव्हते!). मारिषाचे माहेरचे नाव वार्क्षी.-

हे मारिषाचे आईवडिल. कंडु ऋषींचा आश्रम गोदावरी काठी होता. त्यांची तपस्या भंग करण्यासाठी इंद्राने प्रम्लोचेला पाठवले. तिने कंडुंची तपस्या भंग करून त्यांच्याशी लग्न केले. पुढे कंडुंना सत्य परिस्थितीची जाणीव झाल्यावर ते प्रायश्चित्त घेण्यास निघून गेले आणि प्रम्लोचा स्वर्गात परतली अशी गोष्ट आहे.

यावरून मारिषा ही आद्य मराठी स्त्री होती असे म्हणता यावे - ह. घ्या.

आता पुढे पाहिले तर जेव्हा प्रचेतस तप करण्यासाठी गेला तेव्हा पृथ्वी सांभाळणारे कोणीही उरले नाही. झाडांनी पृथ्वीचा ताबा घेतला. हे लक्षात आल्यावर प्रचेतसने क्रोधित होऊन सर्व झाडांचा विनाश करण्याचे ठरवले. तेव्हा झांडाचा पोषणकर्ता सोम (चंद्रदेव) याने येऊन रदबदली केली आणि प्रचेतसाचा राग शांत व्हावा त्याचे लक्ष हटावे म्हणून त्याचे लग्न मारिषाशी लावून दिले.

 
अंग. काशी. कोसल. वृज्जी महाजनपद-( यांचेही आठकुळे -वृज्जी,विदेह,लिच्छवी,ज्ञातृक,उग्र,भोग ऐच्श्वाव ) चेदी. वत्स.मत्स(मात्स्य). अवंती. मल्ल. कुरु.पांचाळ. अश्मक. गांधार. शूरसेन. कंबोज. मगध.

आणि मग पुढे १) ब्रहद्रथ वंश. २) हर्षक वंश. ३) शिशूनाग वंश.४)नंद वंश. ५) मौर्य वंश.

संदर्भ :- भारताचा इतिहास व संस्कृती ( इ.स.६५० पर्यंत ) डॉ. एस.एस. गाठाळ. प्रपाठक, इतिहास विभागप्रमुख.स्वा.रा.ती.म. अंबाजोगाई. पृ.क्र. १२४ ते १३१ 

मी ऐकलेला उच्चार प्रचेतस पण शाश्वती नाही. असे १० मुलगे (प्रत्येकाचे नाव प्रचेतसच कसे असेल? तेव्हा ती पदवी असावी.) असल्याचे वाचले आहे. पैकी एक पुढे गादीवर बसला असावा.

माझ्या माहितीप्रमाणे मनुला केवळ् दोन मुलगे (उत्तानपद आणि प्रियवर्त)होते आणि तीन मुली होत्या (आहुती, आरुशी आणि प्रसुती). आहुतीने ऋषी रुची, आरुशिने ऋषी च्यवन यांच्याशी विवाह केला तर प्रसुतीला तिचा भाऊ उत्तानपद याच्या मुलाबरोबर संग करायला लाऊन (की विवाह झाला? मला कल्पना नाही) वंश वाढवायचा ठरले. त्यांना प्राचिनवर्हि झाला. त्याने सागराची (समुद्र) मुलगी सवर्णा हिच्याबरोबर लग्न केले. त्यांना एकावेळी दहा मुले झाली (काही कथांच्या मते १० झरे( / नद्या )फुटले आणि प्रत्येक झरा म्हणजे एक मुल होतं) त्यांची सगळ्यांची मिळून एक पत्नी होती मरिषा (बहुपतित्वाची ही हिंदू पुराणातील पहिली कथा).
तर ह्या प्रचेतासांनी दहा हजार वर्षे पाण्याखाली उग्रतप करून विष्णूस प्रसन्न करून घेतलं व विष्णूने तुमचा मुलगा ब्रह्मासारखा विश्वनिर्मिता होइल असा वर दिला. हे प्रचेतास पाण्याबाहेर आले तोपर्यंत "अरण्याने" मरिषाचे पालनेपोषण केले होते. ते १० जणांना आपली मुलगी द्यायला तयार होइनात तेव्हा प्रचेतास क्रोधीत झाले आणी त्यांनी आपल्या डोळ्यातील अग्निने अरण्य जाळायला सुरवात केली. पृथ्वीवरील धोका ओळखून ब्रह्मा प्रकट झाला आणि अरण्याला त्याने सांगितले की तु मरिषाचा पालक आहेस. लग्नानंतर ती नवर्‍याकडेच जाईल तेव्हा तीला सन्मानाने जाऊदे.
पुढे या प्रचेतास-मरिषाला दक्ष झाला. विष्णूच्या वराप्रमाणे हा ब्रह्माच् होता (त्याचा अंगठा) फक्त शापामुळे त्याने मनुष्यजन्म घेतला होता. पुढे प्रचेतास यांनी कारभार मुलाकडे सोपवून सन्यास घेतला
आता प्रश्न:
१) वीर कोण? आणि त्याची कथा काय?
२) ध्रुव कोण? त्याचीही कथा काय? (द्रुव उत्तनपदाचा मुलगाच होता का? मग उत्तानपदाची पत्नी कोण?)

रत्येक नावाला अर्थ असतोच, निदान तो असावा अशी अपेक्षा असते. प्रचेतस्‌ म्हणजे सुखी, आनंदी. चतुर, शहाणा(महाभारत ३.२००.१४),
चांगल्या अन्त:करणाचा. अरुण. पहा: किं चायमरिदुर्वार: पाणौ पाश: प्रचेतस: । मंत्रेण हतवीर्यस्य फणिनो दैन्यमाश्रित: ॥--कुमारसंभव २.२१.
हा धरी वरुण जो स्वहस्तकीं । मूळचा अरिगणां अभेद्य की । पाश दीन दिसतो असा कसा । मंत्ररुद्ध हतवीर्य सर्पसा ॥--रा.चिं. श्रीखंडे.

आणि एक राहिलच् .... अक्षाला तीन बायका होत्या ना (पंचजनी, विराणपुत्री अक्सिली, आणि मनु-शत्रुप पुत्री प्रसुती )आणि दिती अदिती वगैरे १३ जणी (अदिती (देवगणाची माता), दिति (हिरण्यकश्यपू -- हिरण्याक्षाची माता), दनु(दानवगणाची माता), अरिष्टा, सुरसा, सुरभी, विनता(पक्षीगणाची [गरुड-जटायु] माता), तांम्रा(प्राणीगणाची माता), क्रोधवशा, इरा (की तुम्ही लिहिल्याप्रमाणे इला?), कद्रु, विष्वा (की तुम्ही लिहिल्याप्रमाणे खसा?)आणि मुनी) या दक्ष-अक्सिलीच्या नसून दक्ष-प्रसुतीच्या आहेत असं वाचल्याचं आठवतय.
प्रश्नः
१. पंचजनीपासून पुढे कोण झालं?
२. प्रसुतिला बर्‍याच मुली झाल्या त्यातल्या ह्या १३ जणींनी कश्यपाशी विवाह केला हे विधान बरोबर आहे का तिला १३च् मुली होत्या?

पुराणांतून काढलेल्या वंशावळीचा हा दुसरा भाग. यांत नवरा बायको (किंवा पुरुष-स्त्री) संबंध "~" चिन्हाने दाखवले असून सर्व स्त्रिया मंद केशरी रंगात दाखवल्या आहेत. येथे वंशावळ बरीच मोठी होत असल्याने केवळ महत्त्वाच्या व्यक्ती दाखवल्या आहेत. एखादी महत्त्वाची व्यक्ती गाळली गेली असल्यास त्यावर चर्चा करता येईल आणि ती तक्त्यात घालता येईल. या व्यक्तींच्या अनुषंगाने येणार्‍या पुराणकथांवर चर्चाही व्हावी.



तुटक रेषा सरळ संबंध न दाखवता, मधल्या काही बिनमहत्त्वाच्या व्यक्ती गाळल्या गेल्याचे दाखवतात.
~ चिन्ह नवरा बायको संबंध दर्शवते.
लाल चांदणी - तिसरा तक्ता कुठून सुरु होईल ते दाखवते.

----------

वरील तक्ता परिपूर्ण असल्याचा दावा नाही. त्यात सुधारणा सुचवाव्या. चित्रावर टीचकी मारल्यास ते मोठे करून पाहता येईल.
लेखिकेला विषयाची संपूर्ण माहिती असल्याचाही दावा नाही. आपल्याकडील माहिती देण्यास उत्सुक असणार्‍या सर्व सदस्यांची आभारी असेन.

 १. कद्रुची मुले नाग की क्रोधवशेची?
२. विनताच्या मुलांमधे जटायु पण वाढवता येईल का . रामायणामुळे तो प्रसिद्ध आहे म्हणून म्हटले :)
३. इंद्र राहिला (अदितीच्या १२ मधला थोरला ना?)

१. कद्रु, क्रोधवशेची मुले नाग पण कद्रुची प्रसिद्ध झाली. सुरसेची मुले सर्प.

२. जटायुपर्यंतची वंशावळ मिळाली नाही. :( ती असेल तर कोणी द्यावी. तसे वानर, अस्वले(जांबुवंत) आणि पुलस्त्य ऋषींचा वंश (रावण) इ. राहिले आहे. ते बहुधा पहिल्या तक्त्यात घालता येईल. वेळ झाला की करते. तसे, जटायु आणि त्याचा भाऊ संपाती ही गिधाडे होती त्यामुळे विनताशी त्यांचा संबंध होता का हे माहित नाही. कश्यप पत्नी ताम्राला मात्र ६ मुली होत्या आणि त्यांच्यापासून प्राणी आणि पक्षीवर्ग वाढला असे वाचले. त्यात गिधांडांचाही उल्लेख आहे.

३. इंद्र अदितीचा पुत्र असल्याचे मीही आधी वाचले होते पण माझ्याकडे असलेल्या माहितीत अदितीचे १२ पुत्र असे - शक्र, अर्यम्, धाता, विधाता, त्वष्टा, पुष, विवस्वान(सूर्य), सविता, मित्रवरूण, अंश, भग, विष्णु. मला वाटायचे सविता म्हणजेच सूर्य. इंद्र यांत आला नाही की त्याचे दुसरे नाव आले आहे याची कल्पना नाही. :( कोणाला माहिती असल्यास ती द्यावी.

जटायुची वंशावळः
जटायुचे वडील अरूण. संपली :) हा तक्त्यात टाकता येइल का?

म्हणजे जटायु गरुडाचा पुतण्या. त्यामुळे ना धड गरुड असं त्याचं रुप म्हणजेच गिधाड असं ही एका ठिकाणी दिलं आहे :)
एका ठिकाणी जटायुचा संस्कृत साहित्यात "जो पाऊस आणि दव हवं तेव्हा पाडु शकतो तो गरुडासारखा पण कमी पिसांचा पक्षी" असं वर्णन आहे असा उल्लेख् आहे. जालावर त्यांनीही कोणतेही उदा. दिलेले नाही तेव्हा हे किती प्रमाण आहे कोणास ठाउक

 
गरुडजन्माची कथा वाचनात आली ती अशी:

कद्रु आणि विनता या बहिणींमधे प्रचंड स्पर्धा होती. त्या स्पर्धेचं रुपांतर पुढे पुढे असुया-मत्सरादी भावनांमधे झालं. या सख्ख्या बहिणी सख्ख्या जावा झाल्यानंतर तर हा प्रकार फार वाढला. कद्रुने आपल्याला सहस्त्र नाग मुलगे व्हावेत अशी इच्छा मनी धरली तर विनताने आपल्याला केवळ दोनच् मुले व्हावीत पण् ती या सहस्त्रांपेक्षाही श्रेष्ठ असावित अशी इच्छा मनी धरली. पुढे कद्रुने सहस्त्र व विनतेने दोन अंडी घातली. कद्रुच्या पहिल्या चार अंड्यांतुन अनुक्रमे शेष, वासुकी, ऐरावत आणि तक्षक ही नागमुले जन्माला आली. पुढे यथावकाश तिला सहस्त्र नागमुले झाली. हिला सहस्त्र मुले झाली तरी विनताच्या अंड्यातुन मुल जन्मास येईना. एकि दिवशी संतापलेल्या अधीर विनतेने एक् अंड कृत्रिमरित्या फोडले. त्यातुन अर्धीच वाढ झालेला एक् पक्षी जन्माला आला. हाच् अरुण! याने जन्मल्या जन्मल्या आपल्या मातेला तिच्य अधीरपणामुळे आपली वाढ न झाल्यामुळे दास्यत्वाचा शाप दिला. पण ती माता असल्याने तिला उ:शाप दिला की जर ती दुसरं अंड मधेच् फोडणार नसेल तर् त्या अंड्यातुन जन्माला आलेलं मुलं तिला दास्यत्वातुन मुक्त करेल. हा अरुण पुढे सुर्याच्या रथाचा सारथी झाला.
इथे विनता दुसरं अंड फुटायची वाट पाहत होती. एके दिवशी ति व कदृ बोलत असताना समुद्रमंथनाचा विषय निघाला. कदृने "सांग पाहु, उच्चैश्रवाच्या शेपटीचा रंग काय आहे. " विनताने निसंशयपणे सफेद असं उत्तर दिलं. कद्रुने पैज लावली की जर शेपुट पुर्ण सफेद नसेल तर तु माझी दासी नाहितर मी तुझी दासी बनेन.
कद्रु विनताला दरवण्यासाठी आपल्या नागमुलांना उच्चैश्रवाच्या शेपटीत लपुन बसायला सांगते. पण मुले नकार देतात तेव्हा कद्रु त्यांना शाप देते की जन्मेजयांच्या यज्ञात तुमचा नाश होईल. तरीही काहि इतर कपटाने कद्रु पैज जिंकते व विनता दासी बनते.
यथावकाश दुसर्‍या अंड्यातुन एक देखणा पक्षी जन्मतो. तो म्हणजे गरुड! तो नागकुळाच्या मागे लागतो आणि मातेला दास्यत्वातुन मुक्त करतो.

नाग आपल्या आईकडुन कपटीपणा घेतात आणि तिलाच् सोडून निघुन जातात. शापाने घाबरुन शेष ब्रह्मदेवाकडे जातो. ब्रह्मदेव त्याला मातेची आज्ञा न मानल्याबद्दल शिक्षा आणि शापातुन वाचायचा उपाय म्हणून पृथ्वी तोलून धरायला सांगतो.

 अरुणाची गोष्ट बरोबर आहे. अशा 'प्रीमॅच्युअर' जन्मलेल्या अरुणाला अर्धवट वाढ झाल्याने पावले नव्हती असे सांगतात.
आता जरा मराठी माणसाच्या खेकडाधर्माला जागते. मला या आपल्या प्रयत्नाच्या अनुषंगाने २ मुद्दे मांडायचे आहेत.
१- प.वि.वर्तक व त्यांनी संदर्भादाखल दिलेली २-४ पुराणे अशी वंशावळ काढण्यासाठी पुरेशी वाटतात का? मुळात लक्षात घेण्यासारखी गोष्ट ही, की आपल्याकडे आजच्या आधुनिक अर्थाने 'इतिहास' ग्रंथ फारच कमी आहेत. एक राजतरंगिणी सोडता विक्रमांकचरितम वगैरे सारख्या इतिहासग्रंथांत इतिहासपेक्षा काव्य आणि अद्भूतच अधिक आहे. पुराण,महाभारत , रामायण यांना आपली परंपरा इतिहास मानते हे जरी खरे असले, तरी आपल्या परंपरेला 'इतिहास' या शब्दाने जे अभिप्रेत आहे व सध्या आपल्याला 'इतिहास' या शब्दाने जे अभिप्रेत आहे यांत बराच फरक आहे. त्यामुळे पुराणांतले संदर्भ ऐतिहासिक मानता येणार नाहीत, असा सर्वसाधारणपणे तज्ञांचा कल दिसतो.
आपल्या या संदर्भांच्या ऐतिहासिकतेमधे रस आहे की नाही ही पुढची गोष्ट झाली. परंतू व्याख्यांच्या या फरकामुळे सर्व पुराणकारांनी किंवा कवींनी हे संदर्भ मुळाबरहुकुम ठेवलेले दिसत नाहीत. कल्पना करा १०८च्या आसपास संख्या असलेली पुराणे+ महाभारत+ रामायण + असंख्य काव्ये यांत संदर्भ किती बदलत गेले असतील! ईक्ष्वाकूकुलाची वंशावळ शोधायला गेले तर अशीच मजा येते. रामायणात एक वंशावळ, पुराणांत दुसरी आणि कालिदासाच्या रघुवंशात तिसरी.
अर्थातच, आपण काही मोठे संशोधक वगैरे नाही, आपल्याकडे पुरेसे माहितीचे स्रोत किंवा मूळ प्रती नाहीत त्यामुळे सर्व पुराणांचा तुलनात्मक अभ्यास करून तक्ता काढणे अशक्य आहे, हे मला मान्य! पण या एका अडचणीची किमान जाणीव असावी असे वाटले म्हणून येथे मुद्दाम लिहिते आहे.
२- असे तक्ते काढण्याचा नेमका उद्देश काय, हे एकदा ठरवावे असे मला अजूनही वाटते. म्हणजे इतिहास म्हणून वंशावळ हवी आहे की मिथके म्हणून? मिथके म्हणून हवी असल्यास या वंशावळींच्या व्हेरिएशन्सना अंत उरणार नाही. इतिहास म्हणून हवी असल्यास आपण योग्य पुराण संदर्भाला घेत आहोत का हे तपासून पहायला लागेल. (प.वि.वर्तक याबद्दल फारसे विश्वासार्ह आहेत की नाहीत हा वादाचा विषय आहे) केवळ कुतुहल म्हणून तक्ता काढता येईलही, परंतू का कोण जाणे ही कल्पना माझ्या मनाला झेपली नाही.
असो, आपला विरस करण्याचा हेतू नाही. परंतू या दिशेने अभ्यास करताना काही महत्त्वाचे मुद्दे मनात ठेवले पाहिजेत असे मला वाटते म्हणून हा प्रतिसादप्रपंच. बाकी मला या वंशावळींची ओ की ठो माहिती नसल्याने त्यांच्या योग्यायोग्यतेची चर्चा करत नाही. 

पुरुरवा--> आयु पर्यंत तक्त्याप्रमाणे. पुढे आयुला पाच मुले नहुष, क्षत्रवृद्ध, रजी, रंभ, अनीना. क्षत्रवृद्धाचा मुलगा सुहोत्र. सुहोत्राला तीन मुले होती काश्य, कुश आणि गृहस्मध. (गृहस्मधाचा मुलगा शुनक ज्याचा मुलगा शौनक (जी शौनकजींची मंदिरे दिसतात ती याची)) काश्याचा मुलगा काशी. काशीचा मुलगा राष्ट्र. त्याचा मुलगा दिर्घतमा. आणि दिर्घतमाचा मुलगा धन्वंतरी.

धन्वंतरीचा मुलगा केतूमान. केतूमानचा मुलगा भीमरथ. भीमरथचा मुलगा दिवोदास. आणि दिवोदासाचा द्युमन.
हाच द्युमन अनेक नावांनी ओळखला जातो जसे, प्रतर्दन, शत्रुजित, ऋध्वज आणि कुलवायश्व

 धुंधुमार या राजाचे खरे नाव कुवलायश्व (कुलवायश्व नाही*) असल्याचे वाचले. त्याने धुंधु राक्षसाचा नि:पात केला. हा इश्वाकु वंशातील राजा. या राजांच्या वंशात दशरथाच्या बर्‍याच आधी मांधाता नावाचा एक राजा होऊन गेला. तो अतिशय पराक्रमी होता असे सांगितले जाते. हे मंदिर त्याच्या पुत्राने त्याच्या स्मरणाप्रीत्यर्थ बांधल्याचे सांगितले जाते.

याचा उल्लेख काही ठिकाणी कुबलाश्वही केलेला आढळला.
या कुवलायश्वाचे वडिल वृहदश्व. त्यांना वानप्रस्थाश्रमी जायचे होते. पण त्यांचे ऋषि उतंक यांनी सांगितले , "आता अरण्यात राज्य सोडून जाऊ नकोस. आपल्याकडे जो समुद्र आहे त्याच्या वाळूत धुंधु नावाचा राक्षस आहे. हा इतका बलशाली आहे की त्याने एकदा उच्छ्वासातून सूर्याला आठवडाभर झाकून ठेवलं होतं आणि अजुनही कोणताही देव (आदित्य) त्याला मारु शकलेला नाही. माझ्या तपस्येत हा राक्षस अनेकदा व्यत्यय आणतो. तेव्हा त्याचा बिमोड केल्याशिवाय वानप्रस्थाश्रमी जाऊ नकोस. तु त्याचा बिमोड करण्यास तयार असल्यास मी तपस्येतुन आतापर्यंत जी सिद्धी आणि विद्या मिळवली आहे ती तुला देईन"
तेव्हा वृहदश्व म्हणाला की "तुमची आज्ञाच असेल तर मी जाईनच् पण मला विचाराल तर धुंधुला मारायला माझा मुलगा कुवलायश्वही पुरेसा आहे. तरी ही शक्ती-युक्ती-विद्या-आयुधे त्याला द्यावीत. मी ठरवल्याप्रमाणे वानप्रस्थाश्रम घेतो."
उतंकानी आपली विद्या कुवलायश्वाला दिली. तो व त्याचे भाऊ यांनी मिळून धुंधुबरोबर युद्ध चालु केले ज्यात त्याचे ३ सोडून सगळे भाऊ मेले (हे तीन दृदश्व, चंद्राश्व, कपिलाश्व पळून गेले). आणि उरलेल्या कुवलायश्वाने धुंधुला एकट्याने ठार केले. म्हणून त्यास धुंधुमार नाव पडले.
(उतंकांनी खुष् होऊन मेलेल्या भावांना सरळ स्वर्गात प्रमेश मिळण्याची व्यवस्था केली ;) )

गरूड हा गरुडच् माणूस नव्हे. विनताने पक्ष्यांच्या कुलाला जन्म दिला त्यातील ज्येष्ठ पुत्र गरूड आणि त्याने पुढे पक्ष्यांचे राजापद स्विकारले. हिंदु पुराण केवळ मानवाशी निगडित नसुन मानव, देव, दानव, दैत्य, राक्षस, पिशाच्च्, प्राणी, पक्षी, सरपटणारे, यक्ष, मरुत्, गंधर्व अश्या अनेक प्रकारच्या जिवांचे/वंशाचे आहे.

गांधार राजे असताना या भागात शांतता असावी असे वाटते. ते दैत्य कुलातील असले तरी. परंतु नंतर हा प्रदेश सतत भटक्या टोळीयुद्धात राहिल्या. शक, हुण, मंगोल इ. या भटक्या टोळ्यांची स्वतःचीच अवस्था इतकी वाईट असे की ते थोड्या संख्येने आणि अपुर्‍या शस्त्रांशिवाय हल्ले करत, त्यामुळे पकडले जाण्याची शक्यता जास्त. तेव्हा हल्ला करताना तेथील सर्वांची एकजात कत्तल करणे, आगी लावणे, बायका ताब्यात मिळाल्या तर त्यांच्यावर बलात्कार करून आपली संतती वाढवणे असा मार्ग ते अवलंबत. एकंदरीतच प्रदेशाची मानसिकता क्रूर झाली असेल किंवा हीच जीवनपद्धती आहे असे रुढ झाले असेल तर त्यात नवल नाही.

येथे चंगीझ खानाचे घोषवाक्य वाचावे -

पुरुषाकरता सर्वोत्तम आयुष्य कोणते असेल तर, आपल्या शत्रूला हुडकून त्याची कत्तल करणे, त्याची संपत्ती लुटणे, त्याच्या कुटुंबीयांच्या रुदनाचा आनंद लुटणे, त्यांचे घोडे पळवणे आणि त्यांच्या बायकांवर बलात्कार करणे.

या वाक्याचा मोठेपणा सांगण्याचा कोणताही हेतू नाही फक्त ही जीवनपद्धती टोळ्यांत सर्वमान्य होती.

लेखनदोष: (१) मराठीत हिरण्यकश्यपु असे लिहिले जाणारे नाव संस्कृतमध्ये हिरण्यकशिपु असे आढळते. (२) द्रुह्य हे नाव द्रुह्यु असेही लिहितात आणि तसे ते जास्त वापरात आहे. (३) सिंहीका, दिलिप, पुरुरवा ही नावे अनुक्रमे सिंहिका, दिलीप आणि पुरूरवा अशी हवीत.
(४)रुचिक हे अशुद्ध. ऋचीक(ची दीर्घ) हवे. (५) खशा हे नाव खसा असे वाचल्याचे आठवत नाही.

कश्यपाला तेरा पत्‍नी होत्या हे खरे असले तरी त्यांच्यापैकी अनेकांना एकापेक्षा जास्त नावे होती. त्यातली काही अशी: अदिती, अरिष्टा, इरा, कद्रू, कपिला, कालका, काला, काष्ठा, क्रोधवशा, क्रोधा, खशा, ग्रावा, ताम्रा, तिमि, दनु, दनायु, दया, दिति, धनु, नायु, पतंगी, पुलोवा, प्राधा, प्रोवा, मुनी, यामिनी, वसिष्ठा, विनता, विश्वा, सरमा, सिंही, सिंहिका, सुनेत्रा, सुपर्णा, सुरभि, सुरसा, सूर्या इत्यादी इत्यादी.
फक्त २४ अप्सरा मुनी ऊर्फ वसिष्ठाच्या मुली. शुची ताम्राची. तसेच आलंबा, उत्कचोकृष्टा, कपिला, केशिनी, निर्‌ऋता, महाभागा, शिवा या खशाच्या. अनवद्या, अरूपा, तिलोत्तमा, रंभा वगैरे अरिष्टाच्या जवळजवळ २१ मुली मोठेपणी अप्सरा झाल्या. -
पुराणांत अनेकांना एकापेक्षा जास्त नावं (कधीतरी पदवी) यांनी संबोधले गेल्याचे दिसते.
सीतेच्या वडिलांचे नाव सीरध्वज. त्यांना आपण त्यांच्या जनक या कुलनामाने ओळखतो. (सीरध्वजांच्या पित्याचे नाव र्‍ह्स्वरोमन्‌).
तसेच रामाला राघव, धृतराष्ट्रपुत्रांना कौरव, तसेच भार्गव, काश्यप इत्यादी. या काश्यप कुलामध्ये १५हून जास्त प्रसिद्ध व्यक्ती होऊन गेल्या. सर्वजण काश्यप हेच नाव लावत होते. 

 
 
मौर्य-कला (भाग १)
सकाळ वृत्तसेवा
5–6 minutes
- अजेय दळवी

खरं तर जग जिंकायला निघालेलं ग्रीक सैन्य, भारताच्या पूर्वेपर्यंत धडक मारून नंद वंशाचं मगध राज्य जिंकण्याची अभिलाषा बाळगून होतं. भारतात प्रवेश करताना वायव्येकडच्या छोट्या छोट्या गणराज्यांशी आणि पुरू राजाशी लढून थकल्यानंतर, जिंकलेल्या प्रदेशावर राज्यपाल नेमून ॲलेक्झांडर परत फिरला.

मगधचा नंदवंशीय राजा सामर्थ्यवान असला तरी जुलमी होता. त्या असंतोषाचा फायदा घेत चंद्रगुप्त मौर्य या शूर आणि महत्त्वाकांक्षी सरदारानं विष्णुगुप्त चाणक्यांच्या मदतीनं पंजाबमध्ये सैन्याची जमवाजमव करून लहान-मोठी राज्ये आणि ग्रीक सत्तेखालील प्रदेश जिंकला...मगधावर स्वारी करून नंद राजाची हत्या केली व पाटलीपुत्र इथं - म्हणजे सध्याचं पाटणा - मौर्य राजसत्तेची स्थापना केली.

मौर्य साम्राज्यावर मोठ्या सैन्यानिशी चढाई करणारा ग्रीक सत्ताधीश सेल्युकस निकेटरचा चंद्रगुप्तानं पूर्ण पराभव केला व अशा प्रकारे प्राचीन भारताच्या इतिहासातलं हिमालयापासून म्हैसूरपर्यंत आणि कलिंगवगळता काबूल-कंदाहारपासून बंगालपर्यंत एक विस्तीर्ण असं पहिलं एकछत्री अंमल असलेलं साम्राज्य प्रस्थापित झालं.

त्यादरम्यान चंद्रगुप्ताच्या दरबारास भेट देणारा ग्रीक सत्ताधीश सेल्युकस निकेटरचा वकील (उच्चाधिकारी) मेगॅस्थेनिसलिखित ‘इंडिका’ या दस्तऐवजात चंद्रगुप्ताच्या भव्य आणि सुंदर राजवाड्याचं वर्णन आहे, तसंच इसवीसन ४०० मध्ये आलेल्या फाहियान या चिनी प्रवाशानंही ‘या प्रासादाच्या भिंती, दरवाज्यावरील कोरीव काम, तसंच शिल्पकाम मानवानं केलेलं आहे असं वाटत नाही’ असं नमूद करून ठेवलं आहे.

चंद्रगुप्तानंतर त्याचा मुलगा बिंदुसार यानं २५ वर्षं शांततेत राज्य केलं. त्यानंतर आलेला त्याचा पुत्र सम्राट अशोक यांची महत्त्वपूर्ण राजवट सुरू झाली. साम्राज्य मोठं असलं तरी कलिंग देश - म्हणजे सध्याचं ओडिशा हे राज्य - मात्र स्वतंत्र होतं. तेव्हा, कलिंग देशावर स्वारी करून ते आपल्या साम्राज्याला जोडताना झालेल्या युद्धात साधारणतः एक लाख लोक मारले गेले. दीड लाखापेक्षा जास्त युद्धकैदी झाले.

त्यानंतर उद्भवलेली रोगराई आणि पडलेला दुष्काळ यांमुळे लाखो लोक मरण पावले. या मानवसंहाराचा सम्राट अशोक यांना पश्चात्ताप झाला. कलिंगयुद्ध शेवटचं ठरलं. त्यानंतर सम्राट अशोक यांनी अहिंसाप्रधान बौद्ध धर्माचा स्वीकार करत उर्वरित आयुष्य धर्मप्रसारात व्यतीत केलं.

या काळात शत्रुरहित असं एकसंध बलशाली मौर्य साम्राज्य अस्तित्वात आल्यामुळे शांतता आणि संपन्नता आली. परकीय संस्कृतीशी सलोख्याचे संबंध आल्यामुळे कलेला नवचैतन्य लाभून तिचा उत्कर्ष झाला. शांतता, एकांतवास, ध्यानधारणा, आध्यात्मिक चिंतन यासाठी ऋषी-मुनी, भिक्षू हे अनेकदा डोंगरांत नैसर्गिकपणे निर्माण झालेल्या गुहांमध्ये राहत असत.

सम्राट अशोक यांच्या काळात डोंगराळ खडक मुद्दाम फोडून गुहा निर्माण करण्याची प्रथा सुरू झाली आणि एक खास भारतीय वास्तुकला जन्माला आली.

बिहारमध्ये असलेली लोमश/लोमस ऋषींची गुहा ही तत्कालीन लाकडी बांधणीच्या सुंदर वास्तूची हुबेहूब नक्कल असल्याचं जाणवतं.

सध्याच्या जहानाबाद जिल्ह्यात डोंगराळ भागात ही गुहा आहे. तिच्या दर्शनी भागावर अश्वनालाकृत कमान कोरलेली आहे. तिच्या आतील अर्धवर्तुळाकार पट्टीत उथळ उठावात दोन्ही बाजूंनी मध्याकडं येणाऱ्या हत्तींच्या रांगा कोरलेल्या आहेत. आतील भागात आलंकरण नसलं तरी दगडी भिंतीला दगड घासून हा भाग मौर्य पद्धतीनं आरशासारखा गुळगुळीत करण्यात आला आहे.

सम्राट अशोक यांनी सर्वसामान्य माणसाला सदाचार शिकवण्यासाठी स्तंभलेख, गुहालेख आणि गिरिलेख हे पाली भाषेत कोरून बौद्ध धर्माज्ञा पोहोचवण्याचं मोठं कार्य केलं. असेच सुमारे ३४ शिलालेख देशाच्या चारही भागांत सापडले आहेत. मौर्यकाळातल्या कलाकृती अभ्यासताना काही मोजकी शिल्पं आणि त्यातही काही अत्यंत महत्त्वपूर्ण असे स्तंभशीर्ष उपलब्ध आहेत.

सम्राट अशोक यांनी साधारणतः चाळीस फूट उंचीचे सुमारे ३० स्तंभ राजमार्गांवर, राज्याच्या सीमेवर आणि महत्त्वाच्या धार्मिक ठिकाणी उभारले. हे स्तंभ चुनारच्या खाणीतल्या पिवळ्या वालुकाश्मात आहेत. या स्तंभांपैकी तेरा स्तंभ आजही उपलब्ध आहेत.

त्यावरील एक किंवा अनेक प्राण्यांच्या शिल्पांनी बनवलेले स्तंभशीर्ष हे शिल्पकलेचा उत्कृष्ट नमुना म्हणून ओळखले जातात. सर्व स्तंभांवर अशोक यांच्या १४ आज्ञा कोरलेल्या आहेत. या स्तंभांसारखी झिलई मौर्यकाळापूर्वी आणि नंतर कोणत्याही शिल्पात आढळत नाही. यांपैकी लौरिया-नंदनगडचा सिंहस्तंभ बिहारच्या चंपारण जिल्ह्यात आज दोन हजार वर्षांनंतरही सुस्थितीत पाहायला मिळतो.

बिहारमधील रामपूर इथं सापडलेलं वृषभ स्तंभशीर्ष हे वालुकाश्म दगडात एकसंध घडवलेलं आहे. आखूड शिंगं, उभारलेले कान, मोठ्या आकाराचं वशिंड...असा हा धष्टपुष्ट वृषभ आहे. मात्र, या शिल्पात बैलाच्या उन्मादाचा लवलेशही आहे. उलट, हे वृषभशिल्प पाहताना सौम्यताच अनुभवाला येते. सर जॉन मार्शल यांनी तर ‘भारतात निर्माण झालेल्या प्राचीन शिल्पांमधलं सर्वोत्कृष्ट शिल्प’ अशी या शिल्पाची प्रशंसा केली आहे.

(लेखक हे चित्रकार आणि कलाभ्यासक आहेत.)

वसाहत अश्मयुगीन मानवाची
सकाळ वृत्तसेवा
6–7 minutes
existence of first human being in maharashtra was Nevasa is famous for archaeological site Sakal

- केतन पुरी

नेवासा म्हणजे संत ज्ञानेश्वरांच्या वास्तव्यानं पावन झालेली भूमी. इथंच ज्ञानेश्वरी या महान ग्रंथाची निर्मिती झाली. या घटनेची साक्ष असलेला ‘पैस खांब’ आजही भाविकांच्या मनात श्रद्धेची ज्योत अखंडपणानं चेतवत उभा आहे. नेवासा पवित्र स्थळ आहे. गावात असणारी दुसरी आकर्षक धार्मिक वास्तू म्हणजे मोहिनीराज मंदिर.

पण, फार कमी लोकांना माहीत आहे, की महाराष्ट्रात वास्तव्य करणाऱ्या सर्वांत पहिल्या मानवाचं अस्तित्व या गावात होतं. नेवासा अश्मयुगीन मानवाच्या वसाहतीचं ठिकाण आणि अतिशय महत्त्वाचं पुरातत्त्वीय स्थळ म्हणून प्रसिद्ध आहे.

भारतीय पुरातत्त्वचे जनक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या डॉ. ह. धी. सांकलिया यांना एका प्रश्नाची उकल होत नव्हती. भारतात अनेक ठिकाणी पुरातत्त्वीय स्थळांचे शोध लागत होते, शास्त्रीय दृष्टिकोनातून या ठिकाणांचं उत्खनन होत होतं.

उत्तर तसेच दक्षिण भारतात आदिमानवाच्या पाऊलखुणा आढळत होत्या. पण महाराष्ट्रात मात्र अशा ठिकाणाचा शोध सुरूच होता. कर्नाटक, गुजरात, मध्य प्रदेशसारख्या ठिकाणी आदिमानवाच्या अस्तित्वाचे अनेक पुरावे उपलब्ध झाले होते.

पण, रामायण काळापासून कायम चर्चेत राहिलेला भाग, मात्र आदिमानव तिथं राहत होता का, याविषयी इतिहास अनभिज्ञ होता. महाराष्ट्र या नावाचा सर्वांत पुरातन लिखित स्वरूपातील उल्लेख सापडतो उत्तर कर्नाटकाच्या ऐहोळे गावात, तिथल्या मेगुती मंदिरावर असलेल्या शिलालेखात.

त्याआधीपासून महाराष्ट्रात मानवी वस्ती होती. पण त्या मानवाच्या अस्तित्वाचं स्वरूप काय होतं, याविषयी अभ्यासक निरनिराळे तर्क लावत, अंदाज बांधत असत. नेवासा गावापासून काही किलोमीटरवर वाहणाऱ्या चिरकी ओढ्याच्या काठी पांढरीचं टेकाड असल्याची बातमी समजली. हा चिरकी ओढा प्रवरा नदीला जाऊन मिळतो.

पुरातत्त्व संशोधकांचा एक समूह त्या जागी गेला. तिथं जमिनीवर आढळणाऱ्या काही पुरावषेशांचा अभ्यास करून उत्खनन करण्याचा निर्णय घेण्यात आला आणि या निर्णयामुळं दख्खनच्या इतिहासाचं संपूर्ण स्वरूप बदललं.

या ठिकाणी डॉ. सांकलिया सरांच्या मार्गदर्शनाखाली १९५० ते ६० या दशकात शास्त्रीय पद्धतीनं उत्खनन करण्यात आलं आणि महाराष्ट्रातील आद्य मानवाच्या खुणा हाताशी लागल्या. आद्य पुराश्मयुगातील मानवाच्या अस्तित्वाचे धागेदोरे सापडले.

त्यामध्ये काही दगडी हत्यारं सापडली. दगडी हत्यारं बनवण्यासाठी लागणारा सर्वांत उत्तम प्रकारचा दगड म्हणजे गारगोटी. उत्तर भारतात तो विपुल प्रमाणात उपलब्ध होता. त्यापासून दगडी हत्यारे तयार करणं, त्यांना आकार देणं, वापर व्यवस्थित होईल अशी धार तयार करणं या दगडावर सोपं जाई. महाराष्ट्रात सर्वत्र बेसाल्ट.

त्याला धार लावणं किंवा त्यापासून दगडी हत्यार बनवणं, हे व्यावहारिकदृष्ट्या शक्य न होणारी गोष्ट होती. पण त्या वेळेच्या मानवाला दगडांचं उत्तम ज्ञान होतं. जमिनीतून निघालेला लाव्हारस थंड झाल्यावर त्याच्या भिंती बनत असत. त्यांना आपण डाईक असं म्हणतो. हे आकारानं लांब, पसरट पण चपटे असत. त्यामुळं त्यांचा वापर करून महाराष्ट्रातल्या अश्मयुगीन मानवानं दगडी हत्यारं केली.

नेवासा इथं उत्खनन करण्यात आलं, तेव्हा या डाईक पासून बनवलेली बरीच हत्यारं उपलब्ध झाली. भारतात मानवाचं अस्तित्व लाखो वर्षांपासून आहे. त्या वेळेचा मानव हा दगडी हत्यारं तयार करत असे. त्यांच्या साहाय्यानं तो तोडणं, कापणं, भोसकणं, तुकडे करणं, छिद्र पाडणं यांसारख्या गोष्टी करत असे.

नेवासा इथं तशाच स्वरूपाची हत्यारं सापडली. दगडी हत्यारांना घडवण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या तंत्रावरून आणि त्यांच्या आकारावरून त्या त्या काळाचं वर्गीकरण करण्यात आलं आहे. नेवासा येथे सापडलेल्या दगडी हत्यारांवरून महाराष्ट्रात अस्तित्वात असणारा पहिला मानव हा आद्य पुराश्मयुगीन काळातील आहे, हे सिद्ध झालं.

चिरकी ओढ्याकाठी झालेल्या या उत्खननानं महाराष्ट्राचा इतिहास लाखो वर्षे मागं गेला आणि सोबतच, अनेक नवीन पुरातत्त्वीय स्थळांचा शोध घेण्याचे प्रयत्न जोरात सुरू झाले. पण या पहिल्या मानवाच्या अस्तित्वाचे पुरावे उपलब्ध झाले असले,

तरीही त्याची शरीररचना कशी असावी याविषयी उत्तर देण्यासाठी एकही मानवी सांगाडा सापडला नाही. उत्खनन केल्यामुळं या जागेचा आदिमानव ते मध्ययुगीन कालखंडपर्यंतचा नेवासा पर्यायानं महाराष्ट्राचा इतिहास पुरातत्त्वीय संशोधनाच्या आधारे मांडणं सोपं गेलं.

आद्य पुराश्म, मध्य पुराश्म, नवाश्म यांसारख्या मानवी विकासाच्या टप्प्यांचा शोध या उत्खननातून लागला. पुढं, १९६०-७० मध्येही या ठिकाणी उत्खनन करण्यात आलं. अश्मयुगीन काळातील दगडी हत्यारं,

मानव शेती करू लागला त्या काळातील खापराची भांडी, चूल, धान्य साठवण्यासाठी तयार करण्यात आलेली मोठमोठाली भांडी, मणी, बांगड्या, तांब्यापासून बनवण्यात आलेल्या वस्तू यांसारख्या अनेक मौल्यवान वस्तू प्राप्त झाल्या.

महाराष्ट्रात शेती होऊ लागली, तेव्हा मानव एका जागी स्थिर झाला. त्याचं दैनंदिन आयुष्य एकाच जागेभोवती फिरू लागलं. त्या वेळेस झालेल्या दफनांमुळं आपल्याला त्या शेती करणाऱ्या आद्य शेतकऱ्यांचे मानवी सांगाडे उपलब्ध झाले आहेत.

पण, त्याच्याही आधी वास्तव्य करणाऱ्या या आद्य मानवाचे मात्र पुरावे नेवासा इथून मिळाले नाहीत. वातावरणातील बदल आणि पाण्याची कमी-जास्त प्रमाणात असणारी उपलब्धता, नैसर्गिक संकटे यामुळे आद्य पुराश्मयुगीन काळानंतर ही जागा ओस पडली असावी. पण नंतर इथे मध्य पुराश्मयुगीन काळातील मानवाचे अस्तित्व आढळते.

पुढं शेती करणारा मानव, त्याच्यानंतर प्राचीन, पूर्व मध्ययुगीन ते मध्ययुगीन कालखंडातील मानवाच्या खुणा एकसलग आढळतात. नेवासासारख्या ठिकाणी एवढ्या मानवी संस्कृतीच्या पाऊलखुणा आढळल्यानं महाराष्ट्राचा मानवी अस्तित्वाचा आद्य ते सद्यःस्थितीपर्यंतचा इतिहास एकसलगपणे समजून घेण्यास फार मदत होते.

आज हे स्थळ चिरकी नाला किंवा चिरकी नेवासा या नावानं पुरातत्त्वीय स्थळांच्या यादीत प्रसिद्ध आहे. डेक्कन कॉलेजच्या पुरातत्त्व विभागात असणाऱ्या संग्रहालयात डॉ. ह. धी. सांकलिया सरांनी केलेल्या उत्खननाची व त्याच्या स्थरांची प्रतिकृती उभी केली आहे. महाराष्ट्रात राहणाऱ्या आद्य मानवाच्या वस्तींपैकी नेवासा हे महत्त्वाचे स्थळ म्हणून आजही आपले महत्त्व टिकवून आहे.

(लेखक हे पुरातत्त्व विषयाचे अभ्यासक असून लोकसंस्कृती तसंच प्राचीन - मध्ययुगीन भारतीय इतिहास हे देखील त्यांच्या अभ्यासाचे विषय आहेत.)

शोध भव्य बंदराचा...
सकाळ वृत्तसेवा
6–7 minutes
- केतन पुरी, ketan.author@gmail.com

इसवी सन १७६१. भारतात फार मोठी राजकीय उलथापालथ झाली होती. पानिपतच्या रणांगणावर भारतातील तत्कालीन सर्वांत प्रभावशाली राजसत्ता असलेल्या मराठ्यांमध्ये आणि अहमदशाह अब्दालीच्या सैन्यामध्ये झालेल्या युद्धात भयंकर नरसंहार घडला. महाराष्ट्राच्या इतिहासात कधीही न विसरता येणारी भीषण घटना त्या दिवशी घडली होती.

उत्तर भारतात ही घटना घडत असताना दक्षिणेत मात्र वेगळ्याच क्रांतीसाठी धडपड सुरू होती. जीन बाप्टिस्ट ले जेंटिल नामक फ्रेंच व्यक्ती भारताच्या पूर्व किनाऱ्यावर येऊन थांबला होता. फ्रान्समध्ये सुरू असलेल्या अतिमहत्त्वाकांक्षी प्रोजेक्टचा भाग म्हणून ले जेंटिल भारतात आला होता. एडमंड हॅली या खगोलशास्त्रज्ञानं एक भाकीत केलं होतं.

शुक्र ग्रह सूर्य आणि पृथ्वीच्या बरोबर मधोमध येणार होता आणि या घटनेमुळं सूर्य आणि पृथ्वीचं प्रमाण अंतर मोजता येण्याची संधी होती. त्यानं जगभरात जवळपास शंभरपेक्षा जास्त शास्त्रज्ञ या घटनेचं निरीक्षण करण्यासाठी वेगवेगळ्या ठिकाणी पाठवले. याचाच भाग म्हणून ले जेंटिल याला फ्रेंच अकॅडमी ऑफ सायन्स मार्फत पुद्दुचेरीला पाठवलं.

मार्च १७६१ मध्ये तो जहाजानं निघाला. कसाबसा मे महिन्याच्या सुमारास तो भारताच्या पश्चिम किनारपट्टीजवळ आला पण कॅप्टनला कळलं, की ब्रिटिशांनी पाँडिचेरी काबीज केलं आहे. निराश झालेल्या ले जेंटिलला फ्रान्सला परतावं लागलं. दुसऱ्यांदा त्यानं मिळालेल्या संधीचा वापर करण्याचं ठरवले. १७६८ मध्ये २७ मार्चला त्यांचं पाँडिचेरी इथं आगमन झाल्यावर गव्हर्नरनं त्यांचे भव्य स्वागत केले आणि दुसऱ्या दिवशी त्यांना त्यांच्या वेधशाळेसाठी जागा निवडण्यासाठी आमंत्रित केलं.

दरम्यानच्या काळात फ्रेंचांनी पुन्हा एकदा पुद्दुचेरीवर आपलं वर्चस्व प्रस्थापित केलं होतं. संक्रमणाच्या आदल्या दिवशी आकाश निरभ्र होते. ले जेंटिल आणि गव्हर्नर उपग्रह पाहण्यास ठरवलेल्या जागेवर पोचले. संक्रमणाचं निरीक्षण करण्यासाठी सर्व काही अनुकूल दिसलं. पण रात्री, आकाश ढगाळलेलं पाहून ले जेंटिलला निराशा वाटली. दुसऱ्या दिवशी सकाळी, दाट ढगांनी वादळ आणलं आणि ले जेंटिलच्या दुर्बिणीचा काहीही उपयोग झाला नाही.

उदास ले जेंटिल आजारी पडला आणि यामुळं त्याच्या घरी जाण्यास विलंब झाला. याच काळात पुद्दुचेरीजवळील अरियानकुप्पम नदीकाठी एका जुन्या वस्तीचे अवशेष असल्याचं ले जेंटिलच्या लक्षात आलं. त्याला मोठ्या विटा, उद्ध्वस्त भिंती आणि जुन्या विहिरींचे अवशेष दिसले आणि त्याला खात्री पटली की हे एखाद्या मोठ्या प्राचीन गावाचे किंवा अगदी एखाद्या शहराचे अवशेष आहेत.

या गोष्टीचा त्यानं सविस्तर रिपोर्ट बनवला. त्यावर चर्चा होऊ लागली, संशोधन होऊ लागलं. पण त्या ऐतिहासिक जागेवर पहिलं संशोधनात्मक कार्य सुरू होण्यासाठी तब्बल दोनशे वर्षांचा कालावधी जावा लागला. वर्ष १९४० मध्ये फ्रेंच पुरातत्त्व अभ्यासकांनी या जागेवर उत्खनन केलं आणि त्यांना सापडलं एक अतिश्रीमंत शहर.. अरिकमेडू..!

पहिल्या शतकाच्या आसपास लिहिलेल्या ‘पेरिप्लस ऑफ एरिथरियन सी’ या प्राचीन ग्रंथामध्ये अरिकमेडू शहराचा उल्लेख आहे. संगम काळातील तमिळ कवितांमध्ये यवनांना परदेशी, मुख्यतः ग्रीक, रोमन आणि पश्चिम आशियाई असं ज्यांना संबोधलं गेलं, जे उत्तम दिवे, सोने आणि वाइन यांसारख्या वस्तू घेऊन आले होते. जेव्हा पहिल्यांदा या जागेवर उत्खनन करण्यात आले, तेव्हा या शहराचा जगासोबत असलेला व्यापारी संबंध आणि प्राचीन शहर म्हणून त्याचं महत्त्व अभ्यासकांनी समोर आणलं.

पुढं, अयप्पन यांनी पुरातत्त्वीय मॅपिंग आणि इतर पद्धतीनं या जागेचा संशोधकीय अहवाल तयार केला. ज्याआधारे, या जागेवर भव्य व्यापारी बंदर असल्याची माहिती उजेडात आली. सन १९४० ते १९५० दरम्यान, आणि नंतर पुन्हा सन १९८८ ते १९९२ दरम्यान, सहा हंगामांसाठी अरिकमेडूचे उत्खनन करण्यात आलं. या सर्व उत्खननामधून प्रचंड माहिती उपलब्ध झाली.

सीझरच्या काळात या प्रदेशात ग्रीक, रोमन व्यापारी आपला माल घेऊन येत असत. त्यामध्ये भरपूर प्रमाणात वाइन, सोने, विविध मण्यांपासून तयार केलेले दागिने, काचेच्या वस्तू अशा अनेक गोष्टींचा समावेश होता. तसेच, इथे सापडलेल्या काही खापरी भांड्यांना त्यांच्या वैशिष्ट्यामुळे ‘अरिकमेडू टाईप १’ असं नाव देण्यात आले आहे. दुसऱ्या महायुद्धाच्या दरम्यान सुद्धा इथं वैज्ञानिक पद्धतीनं उत्खनन होत राहिलं.

रोममध्ये इसवी सनाच्या पहिल्या शतकात तयार करण्यात आलेलं मातीचं भांडं, मणी, दागदागिने, काचेचे दिवे, जेवणासाठी तयार करण्यात आलेलं भांडं अशा अनेक वस्तू सापडल्या आहेत. यावरून इसवी सन पूर्व पहिल्या शतकापासून ते इसवी सनाच्या दुसऱ्या शतकापर्यंत या जागेवर व्यापारी येत होते, विविध वस्तूंची देवाणघेवाण होत होती आणि जगासोबत भारताचे आर्थिक संबंध प्रस्थापित होते याचा अभ्यासकांना शोध लागला.

या वैभवशाली शहराची आजची परिस्थिती मात्र विचित्र आहे. पुरातत्त्व विभागानं या जागेला संरक्षित स्मारकाचा दर्जा दिलेला आहे. २०१२ मध्ये आलेल्या एका चक्रीवादळात या जागेचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं. तसेच, २००४ च्या त्सुनामी दरम्यान या पुरातत्त्वीय जागेचं आधीच मोठं नुकसान झालं होतं. ले जेंटिल यानं बघितलेले पांढऱ्या मातीचे ढिगारे आता नाहीसे झाले आहेत. स्थानिक लोकांनी सन १७५५ पासून इथल्या विटांचा वापर घराचे बांधकाम करण्यासाठी केला होता. मागील तीनशे वर्षांत या जागेचे बऱ्यापैकी नुकसान झाले आहे.

भौगोलिक बदलामुळंसुद्धा ही जागा ओस पडली आहे. अठराव्या शतकाच्या अखेरीस बांधलेली एक पडीक वास्तू सोडली तर आता या जागेवर फारसं काही पाहण्यासारखं राहिलेलं नाही. बाजूला असलेल्या खाडीचाही वापर होत नाही. पुद्दुचेरी शहरापासून अगदी चारएक किलोमीटर वर असलेल्या या अतिमहत्त्वाच्या पुरातत्त्वीय स्थळाला भेट देणारे पर्यटक सुद्धा फार कमी आहेत.

पण विशेष गोष्ट ही आहे, की एकीकडे उत्तर भारतात लढाई सुरू असताना दक्षिणेत सूर्य आणि पृथ्वीचे अंतर शोधण्यासाठी एक मोहीम सुरू होती. त्यातच, अपघातानं या शहराचा शोध लागला. आज या ठिकाणी उपलब्ध झालेल्या महत्त्वाच्या वस्तू पुद्दुचेरी येथील संग्रहालयात पर्यटकांना पाहण्यासाठी ठेवलेल्या आहेत. कधी पुद्दुचेरीला गेलात, तर या पुरातत्त्वीय स्थळाला भेट द्यायला विसरू नका.

राजवंश भारती : मौर्य राजवंश
सकाळ वृत्तसेवा
5–6 minutes
लेखक : ॲड. सुशील अत्रे

महाभारतानंतरच्या काळात भारतातील बहुधा सगळ्यात विशाल साम्राज्य हे मौर्य साम्राज्य होते. पाश्चात्त्य इतिहासकारांच्या दृष्टीने तर तिथंपासूनच भारताचा इतिहास सुरू होतो. त्याच्या आधीच्या काळाला ते ‘इतिहास’ मानायलाच तयार नाहीत. तो भाग जाऊ द्या; पण प्राचीन भारतातील राजवंशांमधे मौर्य वंशाची गणना अग्रक्रमाने होते, यात शंकाच नाही. इतर अनेक प्राचीन राजवंशांप्रमाणेच मौर्य वंशाबद्दलही विद्वानांमधे एकमत नाही. त्यांचा काळ नक्की कोणता, यावर आजही घनघोर वाद होत असतात. (saptarang latest article on Mauryan Dynasty news)

म्हैसूरच्या ग्रंथसंग्रहालयात असलेली कौटिल्याच्या अर्थशास्त्राची मूळ भूर्जप्रत
म्हैसूरच्या ग्रंथसंग्रहालयात असलेली कौटिल्याच्या अर्थशास्त्राची मूळ भूर्जप्रतesakal

प्रचलित मान्यता अशी आहे, की इ. स. पूर्व ३२४ मध्ये चंद्रगुप्त मौर्य सम्राट बनला. नंद वंशातील अखेरचा राजा धनानंद याचा, आर्य चाणक्याच्या मदतीने पराभव करून चंद्रगुप्त मगधाच्या गादीवर बसला. त्याच्या वंशाला ‘मौर्य’ हे नाव कसे मिळाले, यावरही विविध मते आहेत.

चंद्रगुप्त हा राजा धनानंदाचाच दासीपुत्र होता, त्याच्या आईचे नाव ‘मुरा’ असल्याने त्याने आपला वंश आईच्या नावे ‘मौर्य’ ठरवला, असे एक मत आहे. तो एका गुराख्याचा मुलगा होता आणि त्याला चाणक्याने हेरले, असे एक मत आहे. तो ‘मयूर-पोषक’ समाजात जन्मला म्हणून त्याला ‘मौर्य’ नाव मिळाले, असे जैन ग्रंथामध्ये म्हटले आहे.

यापैकी कोणत्याच दाव्याला ठोस पुरावा नाही. त्या काळातले, आज उपलब्ध असलेले ग्रंथ म्हणजे ‘कौटिलिय अर्थशास्त्र’ आणि ‘मुद्राराक्षस’ हे नाटक. यापैकी अर्थशास्त्र हा एकूणच राजधर्म विशद करणारा ग्रंथ आहे. याचा कर्ता कौटिल्य अथवा चाणक्य तथा विष्णुगुप्त हा आहे. या अद्वितीय ग्रंथाची भूर्जप्रत १९०४ मध्ये म्हैसूरच्या ग्रंथसंग्रहालयात सापडली.

मात्र या ग्रंथात चंद्रगुप्तचा स्वतंत्र उल्लेख नाही. ‘मुद्राराक्षस’ हे नाटक लिहिणारा विशाखादत्त तर खूपच नंतरच्या काळातील आहे. त्यामुळे चंद्रगुप्त मौर्य नक्की कोण, हे गूढ आजही कायम आहे. ग्रीक सम्राट अलेक्झांडर इ. स. पूर्व ३२७ मध्ये भारतात आला होता. तो परत गेला (भारत जिंकून वगैरे अजिबात नव्हे.) त्यानंतर चंद्रगुप्त सत्तेवर आला.

चंद्रगुप्तचा सामना ग्रीक राजा/ सेनानींपैकी सेल्युकस निकेटरशी झाला होता; ॲलेक्झांडरशी नव्हे. चंद्रगुप्ताविषयी काहीही सांगायचे, तर चाणक्याला वगळून सांगताच येणार नाही. नंद वंशाचा संपूर्ण उच्छेद करून नवख्या चंद्रगुप्तला गादीवर बसवणारा चाणक्य होता. आजच्या भाषेत तो ‘किंगमेकर’ होता. काही काळ तो मौर्य साम्राज्याचा अमात्यसुद्धा होता.

गंमत बघा, एवढे प्रचंड साम्राज्य ज्यांनी उभे केले ते दोघेही चाणक्य आणि चंद्रगुप्त आयुष्याच्या उत्तरार्धात संन्यस्त होते. चंद्रगुप्त राज्यत्याग करून दक्षिणेत श्रवणबेळगोळला गेला आणि तिथे त्याने भद्रबाहू या जैन मुनींचे शिष्यत्व स्वीकारले. त्यानंतर चाणक्याने काही काळ बिंदुसाराचा अमात्य म्हणून काम केले आणि नंतर वानप्रस्थ स्वीकारले. (latest marathi news)

Ashoka stambh
इ. स. पूर्व ३२४ पासून मौर्य राजवंश सुरू झाला. एक मतप्रवाह असा, की या वंशात एकूण नऊ राजे होऊन गेले. त्यांची नावे अशी अमित्रघात अथवा बिंदुसार, सम्राट अशोक, दशरथ, संप्रति, शालिशुक, देववर्मन, शतधन्वा आणि बृहद्रथ. यांची कारकीर्द इ. स. पूर्व १८४ पर्यंत होती.

त्या साली बृहद्रथाचा सेनापती पुष्यमित्र शुंग याने बृहद्रथाचा वध केला आणि स्वत:चा राज्याभिषेक केला. म्हणजे, सुमारे १४० वर्षे मौर्य वंशाची सत्ता होती. याविरुद्ध ‘कलियुगराज वृत्तांत’ या प्राचीन ग्रंथामध्ये आणि पुराणात नमूद केल्याप्रमाणे मगध राजसिंहासनावर मौर्य वंशाचे एकूण १२ सम्राट होऊन गेले.

त्यांनी एकूण ३१६ वर्षे राज्य केले आणि तो काळ इ. स. पूर्व १५३४ ते १२१८ असा होता. हा मतप्रवाह ज्यांचा आहे, त्यांनीही शेकडो संदर्भ बघून, ग्रंथ वाचून मग आपले मत दिले आहे. त्यामुळे या दोन्ही पक्षांपैकी कोणालाही थिल्लरपणे ‘मूर्ख’ म्हणण्याआधी आपला अभ्यास किती, हे बघणे आवश्यक आहे.

मौर्य सम्राटांपैकी चंद्रगुप्त इतकाच; किंबहुना थोडा अधिकच प्रसिद्ध असलेला राजा म्हणजे सम्राट अशोक! चंद्रगुप्तचा नातू इ. स. पूर्व २७३ ते इ. स. पूर्व २३६ अशी त्याची कारकीर्द मानली जाते. आयुष्याच्या पूर्वार्धात अत्यंत उग्र आणि निर्मम असणारा आणि उत्तरार्धात बौद्ध धर्म स्वीकारून ज्याने हिंसेचा पूर्ण त्याग केला, तो हा अशोक. (latest marathi news)

आज भारताचे राजचिन्ह असलेला चार सिंहांकित ‘अशोक स्तंभ’ ही त्याचीच देणगी आहे. सारनाथ या ठिकाणी उत्खननात सापडलेला हा मूळ स्तंभ आजमितीस सारनाथ वस्तू संग्रहालयात ठेवलेला आहे. तो सुमारे सात फूट उंचीचा आहे. बौद्ध धर्माचा प्रसार भारताबाहेर करण्यात मोठे योगदान अशोकाचे होते.

‘देवानाम् प्रिय .. प्रियदर्शी’ अशी त्याची पदवी होती. अशोकाबाबतही काही इतिहास अभ्यासकांचा दावा असा आहे, की प्राचीन भारतात मौर्यवंशीय अशोक आणि गुप्तवंशीय अशोक असे दोघे वेगवेगळ्या कालखंडात होऊन गेले. ज्याचे अनेक शिलालेख आपण बघतो, तो गुप्तवंशीय अशोक होता.

त्याने नंतर बौद्ध धर्म स्वीकारला. दोन्ही मतप्रवाह आपापल्या दाव्यांना दुजोरा देणारे अनेक मुद्दे मांडतात. या लेखापुरता मी अधिक प्रचलित असलेला मतप्रवाह गृहित धरून मौर्य राजवंशाची माहिती दिली आहे. परंतु एखादी पर्यायी ‘थिअरी’ कोणी मांडली असेल, तर ती न वाचताच बाजूला फेकणे मला योग्य वाटत नाही.

कारण मौर्य वंशाबद्दल कोणताही वादातीत व स्पष्ट पुरावा आज तरी उपलब्ध नाही. तेव्हा, वाचकांनी आपल्या परीने अधिक अभ्यास केला आणि आपले स्वत:चे मत बनवले, तर ती अधिक आनंदाची गोष्ट आहे.

राजवंश भारती : महाजनपदे
सकाळ वृत्तसेवा
4–5 minutes
लेखक : ॲड. सुशील अत्रे

महाभारताच्या युद्धानंतरचा बराच मोठा काळ हा भारताच्या इतिहासातील ‘अंधारा कालखंड’ म्हणावा असा आहे. कोणतीही मोठी राजसत्ता, लोकोत्तर व्यक्ती या काळात झाली नाही. किमान तसा उल्लेख अगदी काव्य पुराणांमध्येही आढळत नाही. ही मधली कालदरी इतकी मोठी झाली, की त्या आधीच्या घटना काल्पनिक वाटू लागल्या.

हा अंधारा कालखंड जवळजवळ इ. स. पूर्व ६-७ व्या शतकापर्यंत राहिला. या शतकात भारतात मध्यवर्ती राजसत्तेऐवजी अनेक लहान-मोठ्या सत्ता स्थापन झाल्या. प्राचीन संदर्भानुसार मध्यम आकाराच्या वस्तीला ‘जनपद’ असे म्हणत आणि जिथे बरीच मोठी लोकवस्ती होती, त्याला ‘महा-जनपद’ हे नाव मिळाले. एक महाजनपद हे एक प्रकारे राज्यच होते. अशा सोळा महाजनपदांचा ऐतिहासिक उल्लेख प्राचीन ग्रंथांमध्ये आढळतो. (nashik saptarang latest Marathi article rajvansh bharati on Mahajanapadas)

महाजनपदांचे वैशिष्ट्य असे, की त्यापैकी काही राजसत्ता होत्या तर काही लोकसत्ता होत्या; म्हणजे ती ‘गणराज्ये’ होती. या महाजनपदांपैकी काहींचा उल्लेख महाभारतातही आला आहे. नंतर त्यांचा उल्लेख हिंदू, बौद्ध आणि जैन वाङ्‍मयात आढळतो.

व्याकरणकार पाणिनीची ‘अष्टाध्यायी’, ‘अंगुत्तर निकाय’ हा बौद्ध ग्रंथ, तसेच ‘भगवती सूत्र’ हा जैन ग्रंथ यामध्ये महाजनपदांची यादीच दिली आहे. या वेगवेगळ्या ग्रंथांमधे असलेली महाजनपदांची यादी अगदी तंतोतंत सारखी नसली तरी काही नावे मात्र सामायिक आहेत आणि त्यांची ‘सोळा’ ही संख्यासुद्धा बहुधा सगळ्या ग्रंथांना मान्य आहे.

ही सोळा महाजनपदे अशी आहेत-

१) अंग २) मगध ३) काशी ४) कोसल ५) मल्ल ६) वृज्जी ७) चेदि ८) वत्स ९) कुरू १०) पांचाल ११) मत्स्य १२) शूरसेन १३) अश्मक १४) अवंती १५) गांधार आणि १६) कंबोज.

ही नावे अंगुत्तर निकायात आलेली आहेत. बौद्ध त्रिपिटकापैकी सुत्तपिटकात हे निकाय आहे. निकाय म्हणजे संकलन- संग्रह. पाणिनीच्या अष्टाध्यायीत काही नावे वेगळी आहेत. जसे शुद्रक, मालव, मद्र इत्यादी. भगवती सूत्रातही मलय, पांड्य अशी काही नावे वेगळी आहेत. (latest marathi news)

यापैकी अगदी प्रमुख महाजनपदे म्हणजे काशी, कोसल, गांधार आणि मगध. बौद्ध काळाच्या आधी ‘काशी’ हे सगळ्यात मोठे महाजनपद होते. बौद्ध कथांमध्ये काशीचा उल्लेख आवर्जून सापडतो. ज्यांनी जातक कथा वाचल्या आहेत, त्यांना आठवेल... ‘‘फार फार वर्षांपूर्वी काशीमध्ये ब्रह्मदत्त नावाचा राजा राज्य करीत होता...’’अशी सुरवात बहुधा प्रत्येक जातक कथेची असते.

पुढे हेच काशी जनपद कोसलांनी ताब्यात घेतले. कंबोज व गांधार महाजनपदे ही एकेकाळी ग्रीकांच्या दृष्टीने भारताचे प्रवेशद्वार म्हणावे, अशा जागी होती, ते आजचे अफगाणिस्तान. या प्रत्येक जनपदाची स्वत:ची नाणीसुद्धा चलनात होती. ‘आहत नाणी’ अथवा ‘पंच मार्क्ड’ या स्वरूपात ती होती. अशी कित्येक नाणी संशोधकांना सापडली आहेत. तो या महाजनपदांचा भौतिक रूपातील पुरावा आहे.

या ‘महा’ यादीमधे नसलेली राजकीयदृष्ट्या किरकोळ असलेली दोन जनपदे अशी आहेत, जी अन्य कारणाने महत्त्वाची ठरली. ती म्हणजे वैशालीचे गणराज्य आणि शाक्य गणराज्य! वैशाली गणराज्याच्या कुंडलपूरला राजा सिद्धार्थ आणि राणी त्रिशलादेवी यांच्यापोटी इ. स. पूर्व ५९९ मध्ये भगवान महावीरांचा जन्म झाला आणि शाक्य गणराज्यात राजा शुद्धोधन आणि राणी मायादेवी यांच्या पोटी इ. स. पूर्व ५६३ मध्ये भगवान बुद्धांचा जन्म झाला. (latest marathi news)

एकजण राजपुत्र ‘वर्धमान’ म्हणून, तर दुसरा राजपुत्र ‘सिद्धार्थ’ म्हणून जन्माला आला. या दोन महापुरुषांमुळे त्यांची जनपदे इतिहासात अजरामर झाली. गौतम बुद्धांनी बौद्ध धर्माची स्थापना केली, तर वर्धमान महावीरांनी २४ वे तीर्थंकर म्हणून जैन धर्माचे पुनरुज्जीवन केले. योगायोग असा, की हे दोघे महामानव समकालीन होते. महावीर हे गौतम बुद्धांपेक्षा सुमारे २५ वर्षांनी मोठे. महाजनपद कालखंडाची इतिहासाला सगळ्यात मोठी देणगी म्हणजे महावीर व गौतम बुद्ध.

महाजनपदांचा कालखंड सुमारे इ.स. पूर्व चौथ्या शतकापर्यंत होता. त्यानंतर यातील मगध राज्य प्रबळ झाले. नंद वंशाने मगधाची सत्ता हाती घेतली आणि एक एक जनपद ताब्यात घेऊन नंद राजांनी पुन्हा एकवार प्रबळ केंद्रीय राजसत्ता उभी केली. जनपदे दुर्बळ होत गेली. काही वर्षांनंतर इ. स. पूर्व ३२१ मध्ये ही सगळी जनपदे मौर्य साम्राज्यात पूर्णपणे विलीन झाली.

तसे बघायला गेले, तर महाजनपदे कोणा एखाद्या राजवंशाच्या आधिपत्याखाली कधीही नव्हती. फार मोठा काळ ती टिकलीसुद्धा नाहीत. त्यांचे आपसांतील संबंध फार सौहार्दपूर्ण होते, असेही नाही. अलीकडच्या काळात, देश स्वतंत्र होत असताना जशी अनेक लहान-मोठी संस्थाने भारतात होती, तशीच त्या काळीही जनपदे होती. ती राजवंश म्हणून दुय्यम असतील, पण तरीही त्यांची दखल आपल्याला घ्यावीच लागेल.

 
 
राज्यातला सर्वांत मोठा शिलालेख
सकाळ वृत्तसेवा
6–7 minutes
- केतन पुरी, ketan.author@gmail.com

जुन्नर तालुका ऐतिहासिकदृष्ट्या खूपच संपन्न आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म याच भागातील शिवनेरी किल्ल्यावर झाला. त्यामुळं जुन्नर भागाविषयी देशात, विशेषतः महाराष्ट्रातील लोकांना बालपणापासून आकर्षण असतं. याशिवाय, जुन्नर भाग अडीच-तीन हजार वर्षांपासून कायम सत्तेच्या केंद्रभागी राहिलेला आहे. सातवाहनाचा उत्कर्षाचा काळ, त्यांचं वैभव आणि अफाट पसरलेले साम्राज्य या भागानं बघितलेलं आहे.

एवढंच नाही, तर संपूर्ण भारतात आढळणाऱ्या लेणींपैकी २०० ते २५० लेणी फक्त जुन्नर परिसरात अस्तित्वात आहेत. त्यामध्ये लेण्याद्री आहे, शिवनेरीच्या साखळी मार्गावर कोरलेली काही लेणी आहेत, अंबा-अंबिका-भीमाशंकर लेणीसमूह आहे, तुळजा सारखे दुर्मीळ चैत्यगृह असलेली लेणी आहेत. ही काही प्रातिनिधिक उदाहरणं आहेत, अशी कितीतरी नावे सांगता येतील.

जुन्नरपासून थोड्या अंतरावर नाणेघाटची लेणी खोदण्यात आली. साधारण दोन हजार वर्षांपूर्वी व्यापार करण्यासाठी नाणेघाट येथे हा मार्ग ‘खोदून’ तयार करण्यात आला. त्या काळातील राष्ट्रीय महामार्ग असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही.

पतीच्या निधनानंतर सक्षमपणानं राज्य चालवणाऱ्या सातवाहन सम्राज्ञी नागणिकाचं कर्तृत्व नाणेघाट येथील गुहेत कोरलेल्या शिलालेखातून आपल्याला समजतं. एवढंच नव्हे, तर सातवाहन राजा-राणी, युवराज यांचे पुतळेही या लेणीत कोरले होते, अगदी त्यांच्या नावासकट. आज मात्र त्यांच्या पायांचा काही भागच आपल्याला दिसतो.

या शिलालेखाचं ऐतिहासिकदृष्ट्या महत्त्व सर्वांत प्रथम उजेडात आणलं साइक्स यांनी. वर्ष १८३३ मध्ये मुंबईत असणाऱ्या ‘Bombay Literary Society’ मध्ये त्यांनी या शिलालेखाविषयीचा आपला शोधनिबंध सादर केला. खरंतर त्यांना हा शिलालेख पूर्णपणानं अनुवादित करता आला नव्हता.

पुढं, सन १८३७ साली साइक्स यांनी जॉन माल्कम यांच्यासोबत रॉयल एशियाटिक सोसायटीच्या जर्नलमध्ये 'Inscription from Boodh caves near Joonar' या सदराखाली शोधनिबंध प्रकाशित केला. या शोधनिबंधामुळं जेम्स प्रिन्सेप याचं लक्ष नाणेघाटकडं वळालं. साइक्स यांनी काही अक्षरांचा छाप घेतला होता, तो प्रिन्सेप यांना पाठवून दिला. तेव्हा लक्षात आलं, की हा शिलालेख ब्राह्मी लिपीत कोरण्यात आला आहे.

पुढं, वर्ष १८८३ मध्ये जेव्हा जेम्स बर्गेस यांनी ‘Report on the Elura cave temple and Bramhanical & Jain caves’ हा अहवाल प्रकाशित केला, तेव्हा त्यामध्ये जॉर्ज बुल्हर यांनी पहिल्यांदाच संपूर्ण शिलालेखाचं वर्णन केलं. सर्वांत महत्त्वाची गोष्ट म्हणजे, ही लेणी एका राजघराण्यातील व्यक्तीनं तयार केली असल्याचं मत त्यांनीच सर्वप्रथम लिखित स्वरूपात मांडलं. ''पश्चिम भारतातील सर्वांत महत्त्वाचा लेख'' या शब्दात नाणेघाटाच्या शिलालेखाचं महत्त्व त्यांनी अधोरेखित केलं.

हा लेख केवळ पश्चिम महाराष्ट्रच नाही, तर दख्खनमधील राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक आणि धार्मिक परिस्थितीवर प्रकाश टाकणारा अतिशय महत्त्वाचा पुरातत्त्वीय साधन म्हणून सुद्धा महत्त्वाचा आहे. लेण्यातील डाव्या बाजूच्या भिंतीवर दहा तसेच उजव्या बाजूच्या भिंतीवर दहा ओळी कोरण्यात आल्या आहेत. मधल्या बाजूला सातवाहन राजवंशातील नऊ महत्त्वाच्या व्यक्तींचे पुतळे उभारले होते आणि त्यांची ओळख करून देण्यासाठी शिलालेखात माहितीसुद्धा देण्यात आली होती.

हा लेख कोरण्यासाठी कारणीभूत असलेल्या सम्राज्ञी नागणिका राणीचा उल्लेख शिलालेखात 'नाग वरदायिनी', 'मासोपवासिनी', 'गृहतापसी', 'चरित ब्रह्मचर्या' या गौरवपर शब्दांनी केला आहे. या शिलालेखाची काही वैशिष्ट्ये आहेत. शिलालेखाच्या सुरुवातीस धर्म, इंद्र, संकर्षण, वसुदेव, चंद्र, सूर्य, दिक्पाल, वरुण, यम, कुबेर या देवांचा उल्लेख आढळतो. एवढ्या संख्येनं देवांचा उल्लेख एकाच ठिकाणी असलेला हा सर्वांत पुरातन शिलालेख आहे.

सम्राट अशोकाच्या शिलालेखात अनेक महत्त्वाच्या गोष्टी कोरण्यात आल्या होत्या. अशोकाच्या शिलालेखानंतर याच शिलालेखामध्ये फार मोठ्या प्रमाणात संख्यांचा वापर करण्यात आल्याचे आपल्याला पाहायला मिळते. १, २, ६, ७, १०, १२, १७, १००, २००, ४००, ७००, एक हजार, चार हजार, सहा हजार एवढंच नव्हे तर दहा हजार आणि वीस हजार ह्या संख्याही इथे आढळून येतात.

महाराष्ट्राच्या तत्कालीन सामाजिक आणि धार्मिक परिस्थितीवर या लेखाच्या आधारे प्रकाश पडतो. त्याचबरोबर प्राचीन काळी होत असणाऱ्या यज्ञविधींचेही उल्लेख या शिलालेखात आढळतात. या राजवंशातल्या राणी नागणिकानं अश्वमेध, राजसूय, अंगीरस अशा तब्बल १५ यज्ञांचं आयोजन केलं होतं. पुष्कळ प्रमाणात दानधर्मही केला होता. त्याचबरोबर, 'कार्शापण' आणि 'प्रसर्पक' या नाण्यांचा लिखित स्वरूपातील हा पहिला पुरावा आहे. एकप्रकारे हा लेख म्हणजे राणीचं जीवनचरित्र म्हटलं तरी वावगं ठरणार नाही.

'सिमुक सातवाहन', 'सिरी सातकर्णी' आणि 'देवी नागणिका' यांच्यासहित परिवारातील इतर सहा महत्त्वाच्या व्यक्ती, असे एकूण नऊ पुतळे इथे कोरण्यात आले होते. पण हे पुतळे काळाच्या ओघात नष्ट झाले आहेत. जर आज ते पुतळे अस्तित्वात असते, तर बहुदा सातवाहन राजवंशातील महत्त्वाच्या व्यक्तींना आपण 'याची देही याची डोळा' पाहू शकलो असतो.

एकूणच काय, तर नाणेघाटाच्या शिलालेखातून बऱ्याच चकित करणाऱ्या गोष्टी सहजतेने उलगडत जातात आणि त्याचे सर्वस्वी श्रेय जॉर्ज बुल्हर, भगवानलाल इंद्रजी, वा. वि. मिराशी, दिनेशचंद्र सरकार आणि शोभना गोखले यांनाच जाते. ब्राह्मी लिपीमध्ये भारतातील बहुसंख्य शिलालेखांची निर्मिती झाली आहे.

अशोकाचे प्रस्तरलेख, स्तंभलेख, महाराष्ट्रातील बुद्ध तसेच जैन आणि इतर अनेक लेण्यांमध्ये आढळणाऱ्या शिलालेखांची लिपी ब्राह्मी आहे. त्यामुळं, ज्याला कुणाला ब्राह्मी लिपी शिकण्याची इच्छा आहे, त्यासाठी नाणेघाट सर्वोत्तम शिलालेख किंवा सर्वोत्तम ठिकाण म्हणून आपल्यासमोर उपलब्ध आहे. तेथील अक्षरं ठळक आहेत. सर्वप्रकारच्या शब्दांची आपल्याला ओळख होते.

डेक्कन कॉलेजमध्ये माझे मास्टर्स सुरू असताना डॉ. दांडेकर सरांनी आम्हाला इथे ब्राह्मी लिपीविषयी महत्त्वाची माहिती सांगत वाचण्यासाठी मार्गदर्शन केले होते. आम्ही इथंच ब्राह्मी खऱ्या अर्थानं शिकलो. या लेणीच्या समोरून जो मार्ग जातो, त्यावर एक दगडी रांजण ठेवलेलं आहे. हा व्यापारी मार्ग असल्यामुळं या भल्यामोठ्या दगडी रांजणात जकातीची नाणी जमा करण्यात येत असत असं सांगण्यात येतं. पण त्याला कसलाही पुरावा नाहीये.

नाणेघाट समृद्ध आहे. पावसाळ्यात स्वर्गासम भासणारा हा भाग आहे. जवळच चावंड, जीवधन, निमगिरी हे किल्ले तर कुकडेश्वरसारखं अतिसुंदर मंदिर आहे. हा संपूर्ण भाग पाहायला निदान दोन दिवस तरी हवेत.

 
 
 
भारतसम्राट चंद्रगुप्त मौर्य : (संपूर्ण)
 https://www.misalpav.com/node/456

सकाळची सूर्याची कोवळी किरणं डोळ्यांवर येण्यापूर्वीच विष्णु झोपेतून जागा झाला. अजून सूर्योदय व्हायचा होता, तरी थोडासा उजेड होता. समोरच्या रस्त्यावर फार काही वर्दळ नव्हती. गवळ्यांचे पाय गोरसदोहनाकरिता गोठ्याकडे वळले होते. काही गृहिणी कमरेवर घागर घेऊन पाण्यासाठी सिंधूतीरावर निघाल्या होत्या. काही नागरिक सूर्यदर्शनाकरिता घराबाहेर पडले होते. कोंबड्याच्या आरवण्याखेरीज इतर पक्ष्यांनीही आपल्या कूजनाने सूर्योदयाची चाहूल दिली होती. त्या थोड्याश्या नीळसर तांबूस प्रकाशानेही रात्री चमकणार्‍या तारामंडलांना आकाशातून नाहीसं करून टाकलं होतं. दूर पश्चिम क्षितिजावर अजूनही चंद्र फिकट मंद दिसत होता.

पण विष्णूला या कशाचच काही नव्हतं. कशाने तरी झपाटल्यासारखा तो उठला. आपल्या अंगावरची वस्त्रं हातानेच वरच्यावर झाडल्यासारखी केली. बरोबर आणलेल्या तुटपुंज्या सामानाची झोळी त्याने खांद्यावर टाकली आणि तडक त्या धर्मशाळेच्या बाहेर पडला. आजूबाजूला एकवार नजर टाकून त्याने दिशांचा अंदाज घेतला आणि पश्चिम दिशेच्या रोखाने वाट फुटेल तशी पावलं टाकू लागला. इतर नगरजनांसाठी ती सकाळ नेहमीसारखीच होती,पण विष्णूच्या आयुष्यातला हा एक महत्त्वाचा दिवस होता. इतका अपार आनंद, एवढा उत्साह आणि इतकी पराकोटीला गेलेली उत्सुकता त्याने यापूर्वी कधीच अनुभवली नव्हती. शेवटी न राहवून त्याने समोरून येणार्‍या गृहस्थाला विचारलं,"महाशय, कृपया मला तक्षशिला विद्यालयाकडे कोणता मार्ग जातो, ते दाखवाल का?"

त्या गृहस्थाने एकदा विष्णूला डोक्यापासून पायापर्यंत न्याहाळलं. अनेक दिवसांच्या प्रवासाने शिणलेली काया, जीर्ण वस्त्र, खांद्यावर अडकवलेली तुटपुंज्या सामानाची झोळी पण चेहरा मात्र अत्यंत तेजस्वी, शोधक नजर असलेले बोलके डोळे, तरतरीत नाक, मोठ्ठं कपाळ आणि डोक्यावरून रुळणारी शेंडी अश्या त्या किशोरवयीन मुलाला पाहून त्या गृहस्थाला मोठी गंमत वाटली. लगेचच योग्य त्या दिशेला त्याने अंगुलीनिर्देश केला. "धन्यवाद महाशय", विष्णु म्हणाला. "शुभास्ते पंथानः", त्या पथिकाने जाता जाता आशिर्वाद दिला. पण ते ऐकायला विष्णूला वेळ कुठे होता? त्याचा अंगुलीनिर्देश पाहताच विष्णूने त्या दिशेने झपाझप पावले टाकायला सुरुवातही केली होती.

तक्षशिला विश्वविद्यालय जसं जवळ येत चाललं तशी विष्णूच्या मनातली उत्सुकता आणखीनच वाढायला लागली. पावलांबरोबरच हृदयाच्या ठोक्यांची गतीही वाढली. डोळ्यांमध्ये एक वेगळीच चमक दिसू लागली."तक्षशिला! माझं किती दिवसांपासूनचं स्वप्न! या विश्वविद्यालयात केवळ आर्यावर्तातूनच नव्हे तर इतर राष्ट्रांमधूनही अनेक विद्यार्थी विद्यार्जनासाठी येतात म्हणे. इथले आचार्यसुद्धा अतिशय कुशल, बुद्धिवान, अनेक विषयांमध्ये पारंगत. कशी असेल इथली शिक्षणव्यवस्था? कसे असतील इथले विद्यार्थी? त्यांच्यामध्ये आपल्यासारखेच विचार असलेले, आपल्याशी मिळताजुळता स्वभाव असलेले मित्र आपल्याला मिळतील का? ह्या विद्यालयात सर्व चौदा विद्या आणि चौसष्ठ कलांचं शिक्षण एका वेळी कसं चालत असेल? इथे आचार्य तरी किती असतील?" अश्या कितीतरी प्रश्नांनी विष्णूच्या मनात काल रात्रीपासून कोलाहल माजवला होता आणि त्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं मिळण्याची वेळ समीप येऊन ठेपली होती.

चालता चालता विष्णू नगराच्या बर्‍यापैकी बाहेरच्या बाजूला आला. त्याला आता बाकी कशाचं भानच राहिलं नव्हतं. आता त्याला समोर दिसत होतं ते फक्त एक मोठ्ठं प्रवेशद्वार आणि त्याच्यापुढे दाट झाडीतून गेलेली एक छोटीशी पायवाट. भराभर पावलं टाकत तो त्या प्रवेशद्वारापाशी येऊन थबकला.

त्याला पाहून द्वारपालांनी त्याला हटकलं, "काय रे, काय नाव तुझं?". पण विष्णूचं त्यांच्याकडे लक्षच नव्हतं. समोरच्या दाट झाडीतून पलिकडे दूरवर तिमजली इमारतीच्या दिसणार्‍या एका कळसाकडे तो टक लावून बघत होता. द्वारपालांच्या त्या प्रश्नावर त्याच्याही नकळत त्याच्या भुवया उंचावल्या गेल्या, अभावितपणे ओठ उघडले आणि शब्द बाहेर पडले, "माझं नाव 'चाणक्य'. मी मगध देशातून इथे उच्चशिक्षणासाठी आलो आहे."

 

 

आपण अतिशय सुंदर विषय निवडला आहे.

चाणक्य मालिके मुळे ही व्यक्तिरेखा अनेक लोकांना माहित झाली असली तरी तिचे कार्य व त्याचे आजही असलेले अपरंपार महत्व ब-याच लोकांना उमजत नाही.

चाणक्याचे अर्थशास्त्रावरील अनेक मते आज लोकांना कदाचित पटणार नाहित कारण चलन स्वरुपातील पैसाच श्रेष्ठ मानण्याची अमेरीकन अर्थशास्त्रज्ञांचीच री आज जग ओढत आहे. त्यातुनच अमेरीकेचे उखळ पांढरे होत आहे ही गोष्ट अलाहिदा.

परंतु सोने नाणे यासहीत चल अचल संपत्ती तसेच पशुपक्षी हे सजीव या सर्वांना मिळुन वित्त संबोधावे तसेच कमीतकमी किंमत मोजुन बाहेरिल वस्तु देशात याव्या व देशातील वस्तु बाहेर जातांना त्यांना जास्तीत जास्त किंमत मिळावी. याचबरोबर देशांतर्गत व्यवहार स्वयंपुर्ण असावा याचा आग्रही चाणक्य ....
विचार करा ..भारतीय चाणक्याचे विचार अमेरीकनांनी उचलले व इतर जगाला उल्लु बनविले.

आपण त्याच्या अर्थशास्त्रीय पैलुवर काही लेखन केले तर ते नक्कीच उपयक्त ठरेल असे मला मनापासुन वाटते.

 

परंतु सोने नाणे यासहीत चल अचल संपत्ती तसेच पशुपक्षी हे सजीव या सर्वांना मिळुन वित्त संबोधावे
याचा अर्थ आज वस्तुविनिमय आणावा असा तर नाही ना. म्हणजे एक कोंबडी द्या आणि पसाभर धान्य आणा. एक हार्डडिस्क द्या आणि बदल्यात एक आयपॉड आणा असं झालं तर अवघड होईल.

चलन स्वरुपातील पैसाच श्रेष्ठ मानण्याची अमेरीकन अर्थशास्त्रज्ञांचीच री आज जग ओढत आहे.
इसवी सनपूर्व ३३० च्या आगेमागे जे जे करणे योग्य होते उत्तम होते ते चाणक्याने केले, चंद्रगुप्ताने केले. म्हणूनच ते थोर आहेत. त्यांनी तेंव्हा जे लिहिले ते त्रिकालाबाधित सत्य कसे असेल? आज चलन स्वरुपातील पैसा श्रेष्ठ मानू नये तर काय श्रेष्ठ मानावे. नुसता गोंधळ झालाय. तुम्हाला काय म्हणायचे आहे ते जरा अधिक नीट स्पष्ट कराल का?

 

खूपच सुंदर विषयास तुम्ही हात घातला आहे. मी देखील चाणक्य भक्त आहे.
पुढील भागांची उत्सुकतेने वाट पहात आहे. असेच छान लिहीत रहा.

तुम्ही योग्य ती तयारी आणि अभ्यास केला असेलच. तरी आवडीचा विषय असल्यामुळे थोडीशी भर टाकू इच्छीतो
पुढील ग्रंथ तुम्हांस मिळाले तर संदर्भासाठी त्याचा नक्की चांगला उपयोग होईल आणि तुमची ही सुंदर कथा अधिक अर्थपूर्ण होईल.
बारीकसारीक तपशीलांनी कथानकास विद्वत्तेचा साज चढतो असे मी मानतो.

कौटिलीय अर्थशास्त्र - ब.रा. हिवरगांवकर (यांच्याइतका अधिक उपयोगी दुसरा ग्रंथ कौटीलिय अर्थशास्त्रावर उपलब्ध नाही.)
अशोक आणि मौर्यांचा र्‍हास - शरावती शिरगांवकर
भारतवर्षाचा इतिहास - गुंडोपंत हरिभक्त
चाणक्य (कादंबरी) - आनंद साधले
चाणक्य (कादंबरी) - भा.द.खेर
आर्य चाणक्य (कादंबरी) - लेखकाचे ओठावरचे नाव विसरलो :(

असो... वाटले म्हणून लिहीले...
(चाणक्यभक्त ) सागर

 

नेमके शब्द काय असावेत ते आठवत नाही पण ह्यात गृहिणी व नागरिक हे शब्द काहिसे विसंगत वाटतात.
तुमची शंका योग्य आहे. पण माझ्या मते हे शब्द बरोबरच आहेत. तक्षशिला नगरात राहणारे ते 'नागरिक'. यालाच 'नगरजन' असाही शब्द आहे. सध्या आपण ''स्वतंत्र भारताचे नागरिक" हा शब्दप्रयोग वापरून वापरून चोथा केला आहे. त्यामुळे कदाचित तो शब्द आपल्याला काल-विसंगत वाटत असावा.
त्याच प्रमाणे 'गृहस्थ आणि गृहिणी' हे शब्दही जुने आहेत. आपण सध्या फक्त नोकरी न करणार्‍या स्त्रियांना 'गृहिणी' म्हणतो. तो अर्थ इथे अभिप्रेत नाही. 'गृहस्थाश्रमी स्त्री' अर्थात 'गृहिणी'.

मोठा डॉन उर्फ अभिजीतने सुचवलेला 'प्रजाजन' हा शब्दही बरोबर आहे. तुम्हाला 'नागरिक' आवडला नसेल तर 'नगरजन' किंवा 'प्रजाजन' असं वाचा.

 

(मागच्या भागात -

चालता चालता विष्णू नगराच्या बर्‍यापैकी बाहेरच्या बाजूला आला. त्याला आता बाकी कशाचं भानच राहिलं नव्हतं. आता त्याला समोर दिसत होतं ते फक्त एक मोठ्ठं प्रवेशद्वार आणि त्याच्यापुढे दाट झाडीतून गेलेली एक छोटीशी पायवाट. भराभर पावलं टाकत तो त्या प्रवेशद्वारापाशी येऊन थबकला.
त्याला पाहून द्वारपालांनी त्याला हटकलं, "काय रे, काय नाव तुझं?". पण विष्णूचं त्यांच्याकडे लक्षच नव्हतं. समोरच्या दाट झाडीतून पलिकडे दूरवर तिमजली इमारतीच्या दिसणार्‍या एका कळसाकडे तो टक लावून बघत होता. द्वारपालांच्या त्या प्रश्नावर त्याच्याही नकळत त्याच्या भुवया उंचावल्या गेल्या, अभावितपणे ओठ उघडले आणि शब्द बाहेर पडले, "माझं नाव 'चाणक्य'. मी मगध देशातून इथे उच्चशिक्षणासाठी आलो आहे."

इथून पुढे - )

त्या द्वारपालाने पुन्हा एकदा त्याला नीट न्याहाळलं, आणि विचारलं, "तुझी अभिज्ञान-मुद्रा?" या प्रश्नावर विष्णु एकदम चमकला, आणि पुन्हा काहीतरी आठवल्यासारखं त्याने कनवटीला हात घातला, आणि आपल्या धोतराची, कमरेजवळ वळवलेली एक घडी उलगडून एक मुद्रा बाहेर काढून त्या द्वारपालाच्या हातावर ठेवली. त्या द्वारपालाने ती मुद्रा उलट-सुलट करून निरखून पाहिली आणि पुन्हा एकदा प्रश्नार्थक नजरेने विष्णुकडे पाहिलं. "ही मुद्रा तुझ्याजवळ कुठून आली? तू कुठे...." . "नाही नाही, ही माझी मुद्रा नाही. मला आमच्या राज्यात राजमुद्रा मिळवणंच शक्य नव्हतं. ही मुद्रा मला शंकरशेटींनी दिली. ते आमच्या राज्यात व्यवसायासाठी आले होते. हे पहा त्यांचं पत्र." असं म्हणून विष्णुने झोळीमधून एक पत्र काढून त्याचा हातावर ठेवलं.

शंकरशेटींचं नाव ऐकल्यावर आणि ते पत्र वाचल्यावर त्या द्वारपालाच्या चेहर्‍यावरचे भाव अचानक पालटले. "तुला शंकरशेटींनी पाठवलं आहे, हे आधीच नाही का सांगायचंस? एवढ्या मान्यवर व्यक्तिकडून तू आला आहेस म्हटल्यावर तू कोण, कुठचा हे प्रश्न आम्ही विचारलेच नसते".
"छे छे! शंकरशेटी तर मला पितृसमान आहेतच, परंतु माझी जन्मदात्री जन्मभूमी ही मला मातेसमान आहे, तिचा प्रथमोल्लेख कसा बरं टाळता येईल? शिवाय माझे गुरू, माझे पिता यांचेही माझ्यावर संस्कार आहेत. आणि त्यांवरूनच तर माणूस ओळखला जातो!"
हे ऐकल्यावर त्या द्वारपालाच्या चेहर्‍यावर हसू उमटलं.
"हसलात का?"
द्वारपाल हसू आवरत म्हणाला, "अरे तू आत्तापासूनच अशी भाषा बोलतो आहेस! तुला इथे येण्याचं प्रयोजनच काय! बरं असो. तुला इथे ही मुद्रा बाळगता येणार नाही. इथे प्रत्येक विद्यार्थ्याकडे विद्यापीठाची अभिज्ञान-मुद्रा असते. ती मी तुला आता देतो, आणि तुझी ही मुद्रा मी माझ्याकडे जमा करून घेतो". असं म्हणून त्या द्वारपालाने ती मुद्रा एका लखोट्यामधे बंद करून ठेवली, आणि त्याच्या कुटीमधे जाऊन एक अभिज्ञान मुद्रा घेऊन आला. त्या बंद लखोट्यावर आता काही एक आकडा लिहिलेला विष्णुने पाहिला. ती अभिज्ञान मुद्रा विष्णुच्या हातावर ठेवत द्वारपाल म्हणाला, "ही मुद्रा आता जपून ठेव. हीच तुझी इथली ओळख. तुला यापुढे कोणत्याही सरकारी कामकाजासाठी ही मुद्रा लागू शकते. कोणाही रक्षकाने तुला सुरक्षेच्या कारणास्तव ओळख विचारल्यास तू ही मुद्रा दाखव, तुझं काम होईल. आता यापुढे तू विद्यालयाच्या प्राचार्यांना भेट आणि त्यांना तुझं हे पत्र दे. ते माझ्या काही कामाचं नाही." त्याने विष्णुच्या हातावर ते पत्र परत दिलं आणि त्याला विद्यालयाची वाट मोकळी केली.

क्षणाचाही विलंब न लावता विष्णुने झपाझप विद्यालयाच्या दिशेने पावलं टाकायला सुरुवात केली. पुढचा मार्ग विचारण्याचंही भान त्याला राहिलं नव्हतं. त्याला आता फक्त त्या झाडींमधून पलीकडे दूरवर त्या तिमजली इमारतीचं शिखर दिसत होतं. सकाळच्या उन्हाने त्याचे कळस असे झगमगत होते, जणू काही तेच एक प्रकाशस्रोत बनून गेले होते, आणि दिव्याकडे झेपावणार्‍या पाखराप्रमाणे विष्णु त्या प्रकाशकिरणांच्या दिशेने झेपावत होता. त्याचं संपूर्ण आयुष्यच आता उजळून जाणार होतं.

गेले कित्येक दिवस विष्णु प्रवासच करत होता. मगधापासून बाहेर पडलेल्या लोंढ्यांबरोबर मजल दरमजल करत तो निघाला खरा, पण त्याला इतरांच्या एवढा वेळ कुठे होता. त्यामुळे एखाद्या ठिकाणी त्याच्या बरोबरचा लोंढा विश्रांतीसाठी थांबला, कि तो त्याच ठिकाणी मुक्काम संपवून निघालेल्या दुसर्‍या घोळक्याच्या शोधात फिरे, आणि असा घोळका सापडलाच, कि मग त्यांच्या बरोबर पुढचा मार्ग चालू लागे. मनातली अस्वस्थता, अजूनही फारशा भूतकाळात न गेलेल्या विषण्ण आठवणी आणि भविष्यकाळाची ओढ त्याला एका ठिकाणी स्वस्थ बसू देत नव्हती. संपूर्ण प्रवासात त्या कटू आठवणी पुन्हा पुन्हा त्याच्या मनामधे पिंगा घालत होत्या. 'काय चुकलं होतं माझं? काय चुकलं होतं माझ्या वडिलांचं? त्य नीच धनानंदाच्या अन्यायी कारभारात आम्ही मुकाटपणे सगळं सहन करून बसून रहावं की काय! शिक्षक हा समाज घडवतो. त्याच्या कलाकुसरीमधूनच समाजशिल्प अवतरत असतं. पण त्या शिल्पाचा पायाच जर ढासळू लागला, तर त्याला सावरणं हे शिक्षकाचंच कर्तव्य आहे. आणि तेच करायचा प्रयत्न केला माझ्या वडिलांनी. प्रजा ही राजाची गुलाम नाही, तर राजा हा प्रजेचा गुलाम आहे. तोच राज्याच्या प्रति उत्तरदायी आहे. हे सत्य सांगण्याचा प्रयत्न केला त्यांनी - नगरजनांना, आणि खुद्द राजाला. पण ज्याची बुद्धी अहंकाराच्या कठीण हृदयाखाली दबून गेली आहे, त्याला कसा पाझर फुटणार? काय करायला हवं होतं त्यांनी? सशस्त्र सेना उभारून राजाला पदावरून खाली खेचायला हवं होतं की काय? पण मग असे आपापसात राज्यपदासाठी लढणारे लोक आहेतच की. असं राज्य हे दुर्बळांचं राज्य होऊन जातं. अश्या राज्याला कोणी वालीच उरत नाही. आणि अश्या राज्याचे टपून बसलेले वैरी अश्या वेळी बरोब्बर बाहेर पडून लचके तोडून घेतात. आमच्या कुटुंबाचे त्या दुष्ट राजाने असेच लचके तोडले. वडिलांना तुरुंगात डांबून ठेवलं. ते जीवंत आहेत की नाहीत ही माहिती कळण्याचीही मुभा ठेवली नाही. राज्यामधून आम्हाला बहिष्कृत केलं. आई आजारी पडल्यावरही मला कोणी भिक्षा दिली नाही. ज्या ज्या माऊलींकडे भिक्षेसाठी हात पसरले, त्यांच्या सर्वांच्या डोळ्यात आमच्यासाठी करुणा होती, पण त्यांचे हात राज-भयाने बांधलेले होते'.
असे विचार करत करतच विष्णु मार्गक्रमणा करत असे. अश्यातच त्याला एका घोळक्यामधे शंकरशेटी भेटले. तक्षशिलेमधले ते एक मोठे व्यापारी. त्यांनी विष्णुला स्वतःच्या पालखीमधे बसवून घेतलं, आणि विष्णुचा पुढचा प्रवास सुकर झाला.

"विष्णु... अरे विष्णुगुप्त...." ह्या हाकेने विष्णु एकदम भानावर आला. मागे वळून बघितलं तर एक विद्यार्थी त्याच्या दिशेने धावत येत होता. चेहराही ओळखीचा वाटत होता. तेवढ्यात नेत्रांना नेत्रांची ओळख पटली. भावनावेगात दोघेही एकमेकांवर कडकडून आदळले. त्या विद्यार्थ्याला मिठी मारत विष्णु म्हणाला"इंदुशर्मा, किती रे बदललास!!"

- पुष्कर ऊर्फ शंतनु भट

 (भाग २ मध्ये - "विष्णु... अरे विष्णुगुप्त...." ह्या हाकेने विष्णु एकदम भानावर आला. मागे वळून बघितलं तर एक विद्यार्थी त्याच्या दिशेने धावत येत होता. चेहराही ओळखीचा वाटत होता. तेवढ्यात नेत्रांना नेत्रांची ओळख पटली. भावनावेगात दोघेही एकमेकांवर कडकडून आदळले. त्या विद्यार्थ्याला मिठी मारत विष्णु म्हणाला"इंदुशर्मा, किती रे बदललास!!") पासून पुढे -

"विष्णु... मला विश्वासच बसत नाहीये की आपली भेट इथे होते आहे. किती वर्षांनंतर भेटतो आहोत आपण!"
"खरंच रे!" विष्णु मिठी सोडवत म्हणाला, "तुम्ही सर्वांनी मगध सोडलंत, आणि आम्ही एकटे पडलो."
"त्या नीच धनानंदाच्या कारभाराला कंटाळून. सर्व-सामान्यांना जगणंच कठीण करून ठेवलं आहे त्यानं. फक्त पाटलीपुत्रच नाही, तर मगधाच्या खेडोपाड्यात राहणार्‍या आचार्यांनाही स्थलांतर करावं लागलं आहे."
"ठाऊक आहे मला. तुम्ही पाटलीपुत्र सोडलंत, पण तुमची कुशलवार्ता मला अजेय कडून कळत होती. शिवाय तक्षशिला ही तर ज्ञानभूमी आहे. इथे तुम्हाला चिंतेचं काही कारण नसावं."
"खरं आहे. पण पाटलीपुत्र ते तक्षशिला हा प्रवास काही सुखद नव्हता, त्याचा प्रत्यय तुलाही आला असेलच की. ह्या दोन शहरांना जोडणार्‍या मुख्य राजमार्गावर - उत्तरापथावर ठिकठिकाणी लुटारूंची वसती आहे. त्यामुळी आम्हाला लपत-छपत आडमार्गाने छोट्या छोट्या गावांमधून मार्गक्रमणा करत यावं लागलं"
हे ऐकून विष्णुची मुद्रा एकदम उग्र झाली. "अरे लुटारू कसले! त्या लुटारू राजाचेच सैनिक आहेत ते. राज्य सोडून जाणार्‍या नागरिकांचं धन हडप करून राज्याची तिजोरी भरण्याचे आदेश देण्यात येतात. मी इथे येताना कर्मधर्मसंयोगाने एका व्यापार्‍यांच्या कळपाबरोबर मिसळलो, त्यामुळे फारसा त्रास झाला नाही. ह्या व्यापार्‍यांकडे स्वतःचं सैन्य असतं आणि शिवाय दरवर्षी राज्याला त्यांच्याकडून मोठ्या प्रमाणात धनलाभ होत असल्यामुळे राजा त्यांना अजिबात हातसुद्धा लावत नाही."
"पण विष्णु, मला खरंच तुमचं आश्चर्य वाटतं. इतक्या हालाखीच्या परिस्थितीमध्ये राहूनसुद्धा तुम्ही पाटलीपुत्रामध्येच रहात आहात. तुझे वडील अगदी निर्भयपणे राजाविरुद्ध जनमत संकलित करत आहेत."
"आहेत नाही ... होते.."
"क्काय??? म्हणजे ... मला समजलं नाही."
एक प्रदीर्घ श्वास घेऊन विष्णु म्हणाला, "इन्दु, माझे आई आणि तात, दोघेही आता ह्या जगात नाहीत."
इन्दुशर्माचे दोन्ही नेत्र विस्फारले. "काय!!!! अरे हे काय सांगतो आहेस तू विष्णु!".

विष्णुच्या चेहर्‍यावर आता कुठलेच भाव नव्हते. हृदयामध्ये अतीव दु:ख, त्वेष दाबून ठेवला असतानाही डोळ्यांमध्ये कुठल्यातरी विचारांचा दृढनिश्चय दिसत होता. इन्दुशर्माला विष्णुकडे त्या अवस्थेत पाहणं अशक्य झालं. त्याच्या खांद्यावर आपले हाताचे पंजे ठेऊन, त्याला बोलतं करावं म्हणून तो पुढे म्हणाला, "अरे विष्णु, काहीतरी बोल! राजाने काही... "
"होय. राजानेच. अगदी सर्व काही.... अगदी सर्व काही हिरावून घेतलं. भासुरकाच्या मृत्यूचं गूढ उकलण्याच्या निमित्तावरून महामंत्री शकदाल आणि आमच्या घरावर दुष्टचक्र आलं. माझ्या वडिलांना तुरुंगात टाकण्यात आलं. त्यांना कुणालाही भेटणं निषिद्ध करण्यात आलं. राज्यामधला असंतोष अत्यंत बळाने दाबून टाकण्यात आला. अशातच राज्यात दुष्काळ पडला. लोकांना खायला अन्न आणि प्यायला पाणी मिळेना. पण राजवाड्यातली कारंजी आणि पंचपक्वान्नांच्या पंक्ती ह्या दुष्काळाच्या दिवसांमध्येही जनतेकडून गोळा केलेल्या कराच्या जिवावर चालूच होत्या. माझ्या वडिलांनी अन्न-पाणी वर्ज्य केलं आणि काही दिवसातच तुरुंगातच प्राण सोडले. ही वार्तासुद्धा आमच्यापर्यंत खूप उशीरा पोहोचली. इकडे तुरुंगाबाहेरही आमचे अन्न-पाण्याविना हाल झाले आणि तशातच आई गेली. माझं असं कुणीच उरलं नाही. आमच्या कुटुंबाला पहिल्यापासूनच वाळीत टाकल्यामुळे तेथे काही शिक्षणाची आशाही उरली नाही. म्हणून मी इथे आलो."

इंदुशर्माच्या डोळ्यात पाणी तरारलं. "विष्णु, अरे माणसानं किती सोसावं, ह्यालाही काही मर्यादा असते रे!"
"पण असा मी एकटा नाहीये. माझ्या कितीतरी बांधवांनी हे सोसलंय, अजूनही सोसताहेत. सार्‍या भरतवर्षावर अवकळा आली आहे. राज्यकर्ते उन्मत्त होऊन स्वैराचार करत आहेत. आणि याचं मुख्य कारण संपूर्ण भरतवर्षातला शिक्षक समाज हा दुर्बळ झाला आहे. जो वर्ग आजपर्यंत समाज घडवत आला, तो ही ह्या राज्यकर्त्यांप्रमाणे स्वार्थी होत चालला आहे. राजाच्या मुलांना शिक्षण देताना स्वतःच्या मुलाला पिठाचं दूध प्यायला देऊन वाढवणार्‍या शिक्षकांची पिढी जाऊन आता शिष्यांकडून दाम घेऊन स्वतःची आणि स्वतःच्या कुटुंबाच्या उदरनिर्वाहाची व्यवस्था लावण्यात तल्लीन होणार्‍या शिक्षकांची पिढी आली आहे. कदाचित त्यात चूक काहीच नसेल, त्यांच्या दृष्टीने, पण तो त्याग कुठेतरी हरवला आहे. माझा दृढसंकल्प आहे, की मी इथे सोळा वर्ष शिक्षण घेऊन अशी योग्यता मिळवेन, की ह्या संपूर्ण शिक्षकसमाजाला एकत्र करून एक न्यायी, संस्कारक्षम राष्टृ निर्माण करण्यासाठी त्यांना प्रेरीत करू शकेन."

विष्णुच्या या उद्गारांवर इन्दुशर्मा अगदी भारावून गेला. तो म्हणाला, "तू म्हणतो आहेस ते पटतंय मला, पण इथे तक्षशिलेत पाहशील, तर इथे तुला असेच त्यागी आणि आपल्या कामाला वाहून घेतलेले गुरुजन पहायला मिळतील."
"म्हणून तर मोठ्या आशेने मी इथे आलो आहे. माझा विचार आहे की आजच मी इथल्या कुलपतींना भेटतो आणि इथे शिक्षण लवकरच सुरू करण्याची अनुमती घेतो."
"अवश्य. पण आत्ता लगेच जाऊन काही उपयोग नाही. ते दुपारी भोजनापूर्वी काही काळ भेटू शकतील. तोपर्यंत आपण ह्या आवारात जरा फेरफटका मारून येऊ म्हणजे तुला या जागेचीही थोडी माहिती होईल."

 

विष्णुगुप्तांचे वडील सामान्य शेतकरी होते असे कुठेतरी वाचले होते व त्यांच्याकडे मुलाला शिक्षण देण्याची आर्थिक क्षमता नसल्यामुळे त्यांनी विष्णुगुप्तांना भिक्षुकीचे शिक्षण घेऊन कमवायला लागायला सांगितले होते. परंतु विष्णुगुप्तांना अधिक ज्ञान मिळ्वायचे असल्यामुळे ते पाटलीपुत्रात आले होते, असे कुठेतरी वाचल्याचे आठवते.
आपण अधिक माहिती द्यावी.

लेखन मालिका लवकर पुर्ण करावी ही विनंती.

 

मलाही निश्चित अशी काही माहिती नाही. पण मी जे काही संदर्भ वाचले आहेत, त्यात असा उल्लेख कुठेही आढळला नाही. वडिलांच्या नावाबाबत दुमत आहे, परंतु ते शिक्षक असल्याचा उल्लेख मी पहिला. माझं वाचन फार नाही हे खरं आहे. पुढच्या भागात भासुरकाच्या मृत्यूचं गूढ ह्याबाबत लिहिणार आहे, तेथे चाणक्यच्या वडिलांबाबत आणखी थोडी माहिती येईल.

मी लिहीत असलेली लेखमाला ही, मी वाचलेले संदर्भ आणि दूरदर्शन वर प्रसारित झालेली मालिका यांवर आधारित आहे. त्यातील गोष्टींची सत्यासत्यता मी पडताळून घेतलेली नाही. किंबहुना तसा माझा उद्देशही नाही. ऐतिहासिक संदर्भ असलेली एक कथा म्हणून तिचा विस्तार करायचा आहे. त्यामुळे ही कथा वाचून कोणतेही ग्रह मनात बनवू नयेत. यातील तपशिलांबाबत अधिक माहिती असल्यास/ काही तपशील चुकीचे निघाल्यास ते कृपया सप्रमाण लक्षात आणून द्यावेत ही विनंती. त्याचा नक्कीच उपयोग होईल.

 

भारतसम्राट चंद्रगुप्त मौर्य : (संपूर्ण)
- o भारतसम्राट चंद्रगुप्त मौर्य o -

भाग १:
चंद्रगुप्त मौर्य हा आपणा सर्वांना भारतसम्राट म्हणून परिचित आहेच. पण तो भारतसम्राट कसा झाला? त्यासाठी त्याला कोणकोणते कष्ट सोसावे लागले? हे मी सांगण्याचा प्रयत्न करणार आहे. या चंद्रगुप्त मौर्याविषयी एक गोष्ट सांगितली जाते, त्या गोष्टीचा प्रत्येक भारतीयाने अभिमान बाळगला पाहिजे. तर ती अभिमानास्पद गोष्ट ही की, "हिंदुकुश पर्वताला ग्रीक लोक 'हिंदी काकेशस' असे म्हणत. हा पर्वत आपल्या राज्याची उत्तर मर्यादा असावी म्हणून सोळाव्या आणि सतराव्या शतकात मोंगल बादशहांनी आणि त्यापुढे इंग्रजांनी खूप धडपड केली. पण ह्यांपैकी कोणालाही जे साधले नाही ते बावीसशे वर्षांपूर्वी एका हिंदू राजाने साधले. तो म्हणजे मौर्यकुलभूषण चंद्रगुप्त "
तर आपण चंद्रगुप्ताच्या जन्मापासून सुरुवात करुया...

चंद्रगुप्ताच्या जन्मासंबंधी अनेक आख्यायिका आहेत आणि खात्रीलायक माहितीही उपलब्ध नाहीये. अनेक तर्क चंद्रगुप्ताच्या जन्माबाबत लढविले गेले आहेत. दंतकथांना आपले संशोधक पुरावा म्हणून मानत नाहीत. पण प्रत्येक दंतकथेच्या मुळाशी सत्याचा अंश दडलेलाच असतो. तेव्हाच तर त्या तयार होतात. यावर माझा विश्वास असल्याने, मला जो तर्क पटला तो मी तुमच्यासमोर मांडणार आहे. तुम्हाला पटेलच असे मी नाही म्हणणार. पण हा एक संभाव्य तर्क आहे यात काही शंका नाही. तर सम्राट चंद्रगुप्ताचा जन्म नंद कुळातच झाला असावा असा माझा तर्क आहे... अरे असे अवाक् का झालात? काय म्हणता? ज्या कुळात तो जन्मला त्याच कुळाचा नाश त्याने स्वतःच्या हातांनी कसा केला? तीच तर खरी गंमत (खरे तर शोकांतिका) आहे. आश्चर्याच्या गोष्टी विसरुन आता आपण मूळ विषयाकडे वळूयात.

मगधनरेश धनानंद राजाला चैनी-विलासी जीवनाची आवड होती. धनानंदाच्या सेवेत 'मुरा' नावाची एक दासी होती. मुरा दिसायला सुंदर होती. विलासी धनानंदाच्या दृष्टीस मुरेचे लावण्य पडताच त्याने तिला स्वतःची खास दासी म्हणून नियुक्त केले. मुरा एक सामान्य दासी असून धनानंदाने तिला आपल्या अंतःपुरातील दासी बनवले. दासीच्या भावनेला त्या काळात किंमत शून्य होती. निदान धनानंदासारखा विषयासक्त मगधसम्राट असल्यावर तो म्हणेल तीच पूर्वदिशा होती.

काही काळानंतर मुरेला धनानंदापासून दिवस गेले. धनानंदाने तिची योग्य ती काळजीदेखील घेतली होती. ती प्रसूत झाल्यावर तिला जो मुलगा झाला तो चक्रवर्ति होईल असे राज-ज्योतिषिंनी राजाला भविष्य सांगितले. ते ऐकून राजाला भय पडले. दासीपुत्र चक्रवर्ति होऊ नये म्हणून त्याने मुरेसकट त्या निष्पाप बालकाला स्वर्गाची वाट दाखवायचा निर्णय घेतला. कसा कोणास ठाऊक पण मुरेला धनानंदाचा बेत कळला. अजिबात वेळ न घालवता मुरेने बाल चंद्रगुप्तासह पलायन केले. मगधाबाहेर गेल्यावर मुरेला एका गुराख्याने आसरा दिला.

एवढ्या अवधीत तक्षशीलेचे जगद्विख्यात आचार्य चाणक्य मगधाची राजधानी 'पाटलिपुत्र' मधे आले. धनानंदाचा मुद्राराक्षस म्हणून एक फार हुशार महा-अमात्य होता. तो अतिशय एकनिष्ठ होता. फक्त तो राष्ट्रनिष्ठ असण्याऐवजी राजनिष्ठ होता. त्याच्यामुळेच मगध साम्राज्याचा गाडा योग्य रितीने हाकला जात होता. त्याच्यावर राज्यकारभार सोपवून धनानंद विलासात दंग झाला. आचार्य चाणक्य दरबारात धनानंदाला अलेक्झांडरच्या आक्रमणाची जाणीव करुन द्यायला आले होते. पण धनानंदाकडे अखंड भारताच्या हिताची दृष्टी नसल्याने त्याने आर्य चाणक्यांची निंदा करुन दरबारातून बाहेर काढले. या अपमानाने क्रोधित होऊन आर्य चाणक्यांनी भर दरबारात आपल्या शेंडीची गाठ सोडली व प्रतिज्ञा केली की, "जोपर्यंत मगधाच्या गादीवर असलेल्या नंद कुळाचा नाश करीत नाही तोपर्यंत मी शेंडीला गाठ बांधणार नाही.... " झालं... आर्य चाणक्यांची ही भीषण प्रतिज्ञा ऐकून धनानंदाने चाणक्याची टर उडवायला सुरुवात केली. मग काय आगीत तेल ओतल्यासारखंच झालं. आधीच भडकलेला आचार्यांचा क्रोधाग्नि आणखीनच भडकला. आचार्य तेथे क्षणभरही न थांबता निघाले. दरबारातून बाहेर पडल्यावर आचार्यांनी थेट तक्षशीलेकडे प्रयाण केले.

भाग २:

कर्मधर्मसंयोगानं म्हणा किंवा धनानंदाचा व नंदवंशाचा काळ जवळ आला होता म्हणा, चाणक्याची व शूर चंद्रगुप्ताची गाठ पडली. चंद्रगुप्त तेव्हा साधारण आठ-दहा वर्षांचा असेल. चाणक्य तक्षशीलेकडे निघाला असताना एके ठिकाणी गुराख्याची काही मुले त्याला दिसली. एक मुलगा ऐटीत एका उंच दगडावर बसला होता. त्यच्या मधुर वाणीने ती गुराखी मुलेच काय पण आचार्यदेखील मोहित झाले. दोन मुलांच्या आपापसातील भांडणाचा न्याय-निवाडा तो गुराखी मुलगा एका जातीवंत राजाप्रमाणे करत होता. चाणक्यांनी लगेच बालचंद्रगुप्ताच्या - होय तो मुलगा चंद्रगुप्तच होता - आईची भेट घेतली. एवढा तीक्ष्ण बुद्धीचा आणि योग्य न्यायबुद्धी असणारा चंद्रगुप्त आचार्यांना हवा होता. देशाचे भवितव्य घडविण्यासाठी आचार्य चाणक्यांनी चंद्रगुप्ताला मुरेकडे मागितले.. आचार्यांनी आपली योजना मुरेला सांगितली. मुलाचे भविष्य सुरक्षित किंबहुना त्याहुन अधिक सक्षम हातांनी घडविले जाणार होते म्हणून आणि मुरेलाही धनानंदाचा सूड घ्यायचा होता म्हणून तिने काळजावर दगड ठेवून बालचंद्रगुप्ताला चाणक्यांच्या हवाली केले.

चाणक्याने मुरेचा निरोप घेतला. मुरेनेही धनानंदाने केलेला अत्याचार बालचंद्रगुप्ताला सांगून त्याच्या हृदयात प्रतिशोध (सूड म्हणू हवं तर) घ्यायची भावना भडकवली . सूडाच्या भावनेने पेटलेला चंद्रगुप्त आपले ध्येय गाठण्याच्या हेगेला.आर्य चाणक्यांबरोबर तक्षशिलेला गेला.
तक्षशिलेला पोहोचताच आर्य चाणक्यांनी मुळीच वेळ वाया न घालवला नाही. चंद्रगुप्ताच्या शिक्षणासाठी चाणक्यांनी पुन्हा तक्षशिला विद्यापीठाचे आचार्यपद स्वीकारले. आचार्यांनी चंद्रगुप्ताला विशेष करुन राजनीती, शस्त्रविद्या, युद्धाचे डावपेच, यांमध्ये निष्णात केले. बाकीच्या विषयांमधेसुद्धा चंद्रगुप्त आपल्या बुद्धीची प्रगल्भता दाखवत होता. जसजसा चंद्रगुप्त आर्य चाणक्यांच्या हाताखाली शिकत होता तसतसा तो आपली बुद्धीमत्ता प्रकट करत होता. मनोमन चाणक्य सुखावले होते. कारण चंद्रगुप्त त्यांच्या अपेक्षेहून अधिक हुशार, चाणाक्ष आणि समंजस होता.

तक्षशिलेत चंद्रगुप्ताने किती काळ शिक्षण घेतले हे अज्ञात आहे. पण साधारण वयाच्या विसाव्या वर्षी त्याचे शिक्षण पूर्ण झाले असावे. शस्त्रविद्येत तर चंद्रगुप्त भलताच तरबेज झाला होता. आता त्याला ध्यास होता तो धनानंदाने त्याच्या आईवर केलेल्या अत्याचारांचा सूड घ्यायचा. त्याच्या तलवारीला धनानंदाच्या रक्ताची तहान लागली होती. आचार्य चाणक्यांनी चंद्रगुप्ताची ही अवस्था आधीच ओळखली होती. आणि त्यानुसार सर्व सिद्धताही केली होती. पण मगधस्वारीत एकच गोष्ट आड येत होती. ती म्हणजे सिकंदराची स्वारी.

अलेक्झांडर सिकंदर हा अतिशय महत्त्वाकांक्षी तरुण योद्धा होता. त्याच्या शिस्तबद्ध सैन्याची माहिती करुन घेण्यासाठी आचार्यांनी चंद्रगुप्ताला त्याच्या काही मित्रांसमवेत सिकंदराच्या गोटात पाठवले. सिकंदरापुढे तक्षशिलेच्या राजाने युद्ध न करताच शरणागती पत्करली होती. अनेक मांडलिक राजांनी सिकंदराला आपले सैन्य दिले होते त्यामुळे सिकंदराच्या सैन्यात आता भारतीय सैनिकही होते. त्यामुळे चंद्रगुप्ताला सिकंदराच्या सैन्यात प्रवेश मिळवळे सोपे गेले. चंद्रगुप्ताची व सिकंदराची भेट झाली होती असे म्हटले जाते. पण या गोष्टीला पुरावा नाही. तरी या दोघांची भेट ही अशक्यदेखील नव्हती. चंद्रगुप्ताने सिकंदराच्या सैन्याची शिस्त, त्यांची युद्धपद्धति, आधुनिक शस्त्रास्त्रे यांचा बारकाईने अभ्यास करुन ते ज्ञान आत्मसात केले. या गोष्टीचा चंद्रगुप्ताला मगधाधिपती होण्यासाठी व नंतरही पुढे फार उपयोग झाला.

सिकंदराच्या सैन्याने पुढे जाणे आता नाकारले होते. सतत सात वर्षे मायदेशापासून दूर राहून सैनिक कंटाळले होते. त्यांना घराची ओढ लागली होती. त्यात भर म्हणून यौधेय गणाच्या सामर्थ्याची माहिती सिकंदराच्या सैनिकांना मिळाली होती. अगोदरच थकलेल्या सैन्याची ही बातमी ऐकून अतिशय वाईट अवस्था झाली. सैन्याने पुढे जाणे तर नाकारलेच पण जर सिकंदराने पुढे जायचे ठरवले तर बंड करुन सिकंदराला ठार मारण्याचा कटदेखील काही लोकांनी केला होता. यौधेय हे अतिशय बलशाली, वीरांचे गणराज्य म्हणून प्रसिद्ध होते. प्रसंगी स्त्रियादेखील युद्धभूमिवर शस्त्रे घेऊन युद्ध करीत. या यौधेय गणराज्याला घाबरुन सिकंदराच्या सैन्याने युद्धाला नकार दिला. परिणामी सिकंदराला आपली जगज्जेता होण्याची महत्त्वाकांक्षा सोडावी लागली व तो मायदेशी परत जाण्यास निघाला.

भाग ३:

सिकंदराने माघार घेताच चंद्रगुप्त व चाणक्य यांनी सैन्याची जमवाजमव करण्यास सुरुवात केली. सैन्य जमताच आचार्यांनी चंद्रगुप्ताच्या साहाय्याने सैन्याला आधुनिक युद्धकलेचे शिक्षण दिले. आपल्या सैन्याच्या सामर्थ्याबद्दल खात्री होताच गुरु-शिष्यांनी पाटलिपुत्राकडे प्रयाण केले. शक्य तेवढ्या लवकर पाटलिपुत्र गाठायचा चाणक्याचा विचार होता. चंद्रगुप्तदेखील आपलं ध्येय साध्य करण्यासाठी आतुर झाला होता. चंद्रगुप्ताच्या सैन्याने लवकरच मगध साम्राज्यात प्रवेश केला. पाटलिपुत्र नगरीपर्यंत चंद्रगुप्ताचे सैन्य सहजपणे पोहोचले. त्यांना प्रतिकार झालाच नाही. होणार तरी कसा? चाणक्याने आपल्या भेदनीतीचा वापर करुन गुप्तहेरांच्या सहाय्याने मगधसेनापतीस केव्हाच आपल्याकडे वळवून घेतले होते. चाणक्याच्या या हुशारीमुळे चंद्रगुप्ताच्या सैन्यावर युद्धाचा प्रसंग आलाच नाही. फक्त पाटलिपुत्र नगरीत धनानंदाच्या राजनिष्ठ सैन्याशी युद्ध करावे लागले. थेट पाटलिपुत्रावर आक्रमण केलेल्या चंद्रगुप्ताच्या सैन्यापुढे मनोबल खच्ची झालेल्या आणि स्तिमित झालेल्या धनानंदाचे सैन्य कसे टिकणार? शेवटी चंद्रगुप्ताने पाटलिपुत्रात प्रवेश मिळविला. ही देखील आचार्यांच्या भेदनीतीचीच कृपा होती. अन्यथा चाणाक्ष अमात्य राक्षस असताना पाटलिपुत्रात प्रवेश मिळणे महाकठीण होते...

पाटलिपुत्रात प्रवेश करताच चंद्रगुप्त व चाणक्य या गुरु-शिष्यांनी थेट धनानंदाच्या महालाकडे धाव घेतली. धनानंदाचा चतुर, मुत्सद्दी अमात्य मुद्राराक्षस हा गुप्तमार्गाने निसटून जाण्यात यशस्वी झाला होता. पण विलासात दंग असलेला धनानंद मात्र चंद्रगुप्ताच्या हातात सापडला होता. चंद्रगुप्ताच्या सैनिकांनी धनानंदाला धरुन ठेवले होते. धनानंद खाली मान घालून उभा होता. आचार्यांनी धनानंदाला आपल्या भर दरबारात केलेल्या प्रतिज्ञेची आठवण करुन दिली. घाबरल्यामुळे व अपमानामुळे त्याची नजर वर उठत नव्हती. मग आचार्यांच्या भेदक नजरेला नजर देणं तर दूरच. आचार्यांनी चंद्रगुप्तास खूण केली. आपल्या तलवारीची तहान भागवण्यासाठी चंद्रगुप्त तयारच होता. आपली तलवार घेऊन चंद्रगुप्ताने धनानंदाच्या दिशेने पावलं टाकण्यास सुरुवात केली. धनानंदाला स्वत:चा अंत समोर दिसताच तो प्राणदान द्यावे म्हणून आचार्यांकडे गयावया करु लागला. पण आचार्यांनी त्याच्याकडे लक्ष दिले नाही. इतक्यात चंद्रगुप्त धनानंदाजवळ पोहोचला आणि....... एकाच घावात चंद्रगुप्तानं धनानंदाचं मस्तक धडावेगळं केलं ...

अशा रितीने चाणक्यानं आपली प्रतिज्ञा चंद्रगुप्ताला हाताशी धरुन तडीस नेली. पण इथंच आपली कथा संपत नाही. चंद्रगुप्त आता मगधसम्राट झाला होता. युक्त्या-प्रयुक्त्या योजून चाणक्याने एकदाचे अमात्य राक्षसाला चंद्रगुप्ताचा महा-अमात्य होण्यास भाग पाडले. चाणक्य आता निश्चिंत झाला होता. चंद्रगुप्ताचा राज्यकारभार सुरळीत चालावा म्हणून चाणक्याने चंद्रगुप्तासाठी व त्याच्या पुढील पिढ्यांसाठी 'कौटीलिय अर्थशास्त्र' हा जगप्रसिद्ध ग्रंथ लिहिला. चाणक्य हा आयुष्यभर चंद्रगुप्तासोबत होता की मगध साम्राज्याची योग्य घडी बसवून अन्यत्र निघून गेला हे कळण्यास मार्ग नाही. पण अमात्य राक्षसाला चंद्रगुप्ताच्या बाजूने वळविण्यास जे अथक प्रयास चाणक्याने केले, ते पाहता चाणक्याने प्रतिज्ञापूर्तीनंतर पुन्हा तक्षशीलेकडे प्रयाण केले असावे असे वाटते.

भाग ४:

साधारण इसवी सनापूर्वी ३०३ या वर्षी अलेक्झांडरच्या एका सरदाराने - सेल्युकस निकेटरने -चंद्रगुप्ताच्या साम्राज्यावर स्वारी केली. पण चंद्रगुप्ताच्या बलाढ्य सैन्यापुढे त्याचा सपशेल पराजय झाला. व त्याला चंद्रगुप्ताशी तह करावा लागला. या तहामुळे सेल्युकसला काबूल, कंदहार व हिरात ही शहरे ज्या प्रांतांच्या राजधान्या होत्या ते प्रांत सोडावे लागले. अशा तर्‍हेने चंद्रगुप्ताने आपले साम्राज्य हिंदुकुश पर्वतापर्यंत नेऊन भिडवले. या तहामुळे चंद्रगुप्ताला फार मोठा प्रदेश मिळाला. त्याबदल्यात चंद्रगुप्ताने सिकंदराच्या या सरदाराला केवळ पाचशे हत्ती दिले. यावरुन हा तह करण्यामधे चंद्रगुप्ताची मुत्सद्देगिरी दिसून येते. सेल्युकस निकेटर हा सिकंदराच्या मृत्यूनंतर बंडखोरी करुन जास्त भूभाग मिळवणार्‍या सरदारांपैकी एक होता. तो शूर असल्याने त्याने बराच प्रदेश बळकावला होता. सिकंदराचा मृत्यू इ.स.पूर्व ३२३ च्या जून महिन्यात झाला. ऑगस्टमधे ही बातमी हिंदुस्थानात पोहोचली व नोव्हेंबरच्या सुमारास चंद्रगुप्ताने पहाडी लोकांचे सैन्य उभारुन ग्रीकांनी बळकावलेले प्रदेश मुक्त केले. इ.स.पूर्व ३२२ च्या आरंभीच सर्व भारतीय भूभाग चंद्रगुप्ताने ग्रीकांच्या सत्तेपासून मुक्त केले. चंद्रगुप्त तेव्हा जेमतेम २५-२६ वर्षांचा असेल. इ.स.पूर्व ३०५ च्या सुमारास सेल्युकस निकेटरने सिंधू नदी उतरुन आर्यावर्तावर स्वारी केली.
चंद्रगुप्ताने सहजपणे त्याचा पराभव करुन हाकून लावले. व झालेल्या तहामुळे सेल्युकसने आपली मुलगी हेलन हिचा चंद्रगुप्ताशी विवाह करुन दिला व त्याच्याशी सख्यत्व केले.

अशा रितीने चंद्रगुप्ताने मगध साम्राज्याचा विस्तार केला व राष्ट्र एकसंध करण्याची आर्य चाणक्यांची कल्पना वास्तवात आणली. सेल्युकसशी सख्यत्व केल्यावर सेल्युकसने मॅगॅस्थिनिस हा आपला वकील चंद्रगुप्ताच्या दरबारी ठेवला. सुमारे पाच वर्ष तो चंद्रगुप्ताच्या दरबारी होता. फावल्या वेळात त्याने तत्कालीन माहिती लिहिली. त्याच्या वर्णनांमुळेच आपल्याला त्या काळाची योग्य माहीती मिळण्यास मदत होते.

चंद्रगुप्त मौर्याने आपल्या पराक्रमाने मगध साम्राज्याचा अशा रितीने विस्तार केला. त्याच्यानंतर त्याचा पुत्र बिंदुसार मगधाच्या गादीवर आला. चंद्रगुप्ताचे थोडेफार राहिलेले साम्राज्यविस्ताराचे काम त्याच्या पराक्रमी पुत्राने व सम्राट अशोकाने पूर्ण केले पण तो वेगळ्या लेखांचा विषय आहे. शेवटी चंद्रगुप्ताने राज्यकारभार बिंदुसाराच्या हाती सोपवला व त्याने जैन धर्माचा स्वीकार केला.
अशी होती 'भारतभूषण सम्राट चंद्रगुप्त मौर्या'ची शौर्यगाथा .... (संपूर्ण)

(चंद्रगुप्त आणि चाणक्य या जोडगोळीचा भक्त) सागर

 आर्य चाणक्यांचे नाव कौटल्य आहे. कौटिल्य नव्हे. असे बाळशास्त्रींचे म्हणणे आहे. सिकंदराने आक्रमण केले ते धनानंदाच्या करकीर्दीत. त्याच्या सामर्थ्यामुळे व इतर काही कारणामुळे सिकंदराने तेव्हा आक्रमण केले नाही. नंतर दोन स्वा-यांत सेल्यूकस़कडून चंद्रगुप्त मौर्याचा पराभव झाला. त्या पराभवांची मीमांसा करून दोष काढून टाकून तिस-या स्वारीत चंद्रगुप्ताचा विजय झाला. इतिहास हा माझा विषय नव्हे. म्हणून मी टिपणे काढलेली नाहीत. तरी माझ्या आठवणीप्रमाणे इसपू ३२३ मध्ये चंद्रगुप्त राजा झाला असावा. इअसपू ३२५ मध्ये चंद्रगुप्ताने विजय मिळविला. इसपू ३२६ मध्ये सिकंदरचा मृत्यू झाला. तरी स्मरणशक्ती ५५ व्या वर्षी त्रास देत असल्यामुळे चू भू द्या घ्या. परंतु बाळशास्त्री यांनी बरेच संदर्भ दिलेले आहेत व ते इतिहासकाराला साजेसे व विश्वासार्ह वाटले. या पुस्तकांतील सुची अंतर्गत (बिब्लीओग्राफी)ग्रंथ मी वाचलेले नाहीत.

 

आर्य चाणक्यांचे नाव कौटल्य आहे. कौटिल्य नव्हे. असे बाळशास्त्रींचे म्हणणे आहे.

धन्यवाद सुधीरराव...
बाळशास्त्री हरदास यांचे हे मत मी वाचले आहे. आणि त्यांनी ज्या पद्धतीने ते विशद करुन सांगितले आहे ते पाहता हा तर्क पटावा असा आहेच. पण कौटल्य चे काळाच्या ओघात कौटिल्य हे नामकरण झाले असावे असे मला वाटते. कालौघात शब्दांत बदल होणे हा संस्कृतीचा अविभाज्य भाग आहे असे मी मानतो....

 
 
 
अश्मयुग :
 
पृथ्वीवर पहिला सजीव कधी निर्माण झाला.


आहे ना आश्चर्यकारक गोष्ट, मग वाचायची ना पूर्ण, नक्कीच वाचा कारण तुम्हाला अशा ऐतिहासिक घटना आणखी समजुन घेण्यासाठी खालील लिन्कवर क्लिक करून टेलिग्राम च्या *"ऐतिहासिक क्षण"* ग्रुपला जॉईन व्हा. आणि नवनवीन घटनांचा वाचून मनाला नवीन ज्ञानाचा खाऊ देत चला. व्हा जॉईन मग.

https://t.me/joinchat/LNqdcE4XP3F54YSf0H6SpQ

अधिक माहितीसाठी संपर्क:-
📞 7588020886

औरंगाबादेत २०१८ च्या जानेवारी महिन्यात झालेल्या अखिल भारतीय वैदिक परिषदेत केंद्रीय मनुष्यबळ राज्यमंत्री सत्यपाल सिंह यांनी चार्ल्स डार्विनच्या उत्क्रांतीवाद सिद्धांतावर आक्षेप घेतला होता. सत्यपाल यांनी निर्माण केलेल्या वादाला ४० वर्षांपासून सूक्ष्मजीवशास्त्राचे अध्यापन करणारे डॉ. रंजन गर्गे यांचे “पृथ्वीवर पहिल्या जीवाचा अवतार’ हे पुस्तक नेमके उत्तर ठरले आहे…

मी कोण आहे? मी आलो तरी कुठून? माझा इतिहास काय? माझे पूर्वज कोण? हाडामासांचा, धट्टाकट्टा, बुद्धिमान मानव आज पृथ्वीवर अधिराज्य गाजवतोय, पण माझे अस्तित्व काय आहे? मी मूळ पृथ्वीचाच की उपरा? दुसऱ्या ग्रहावरून तर आलेलाे नाही ना? या आणि अशाच अनेक रहस्यमयी प्रश्नांनी माणसाला कायम भांडावून सोडले आहे. काहींनी याची उत्तरे देताना धर्माचा आधार घेतला आहे. सूक्ष्मजीवशास्त्राचे अभ्यासक आणि विज्ञान साहित्य लेखक डॉ.रंजन गर्गे यांनी अर्थातच विज्ञानाचा आधार घेत “पृथ्वीवरील पहिल्या जीवाचा अवतार’ या नव्या कोऱ्या पुस्तकात पृथ्वी जीवजन्माचा रंजक मागोवा घेतला आहे.
औरंगाबादेत जानेवारी महिन्यात झालेल्या आखिल भारतीय वैैदिक परिषदेत केंद्रीय मनुष्यबळ राज्यमंत्री सत्यपाल सिंग यांनी चार्ल्स डार्विनचा उत्क्रांतीवाद सिद्धांतावर आक्षेप घेतला होता. ‘आपल्या पूर्वजापासून ते आजी-आजोबांनी सांगितलेल्या गोष्टींमध्ये किंवा पुस्तकात वानरापासून मानवाची निर्मिती झाली असल्याचे कोणीच म्हटलेले नाही. यामुळे डार्विनचा सिद्धांत चुकीचा असून, तो अभ्यासक्रमातून काढून टाकला पाहिजे’, असे आग्रही आणि वादग्रस्त मत सत्यपाल सिंग यांनी मांडले होते. सत्यपाल यांनी निर्माण केलेल्या वादावर ४० वर्षांपासून सूक्ष्मजीवशास्त्राचे अध्यापन करणारे डॉ.रंजन गर्गे यांचे “पृथ्वीवर पहिल्या जीवाचा अवतार’ हे पुस्तक योग्य उत्तर ठरणार आहे. प्रस्तुत पुस्तकात १४ प्रकरणे असून, एक एक करत ते पहिल्या जीवाचे रहस्य उलगडत गेले आहेत.

पृथ्वीवर पहिला जीव कसा निर्माण झाला, हे जाणून घेण्यासाठी थोडाफार नव्हे तर तब्बल ४.५ अब्ज वर्षांपूर्वीपासूनचा इतिहास धुंडाळणे क्रमप्राप्त ठरते. मात्र, यातील अत्यंत तोकडा इतिहासच मानवाला ज्ञात आहे. सुुपरनाेव्हाच्या स्फोटातून सूर्यमाला अस्तित्वात आली. याचा एक घटक म्हणजे पृथ्वी. पृथ्वीचे थंड होणे, पृथ्वीवर पहिल्या पावसाचे आगमन, अवकाशात सेंद्रिय रसायनांची निर्मिती आणि पावसाच्या पाण्याच्या एका डबक्यात प्रजननक्षम अशा पहिल्या जीवाचे अवतरण, असे एक एक टप्पे घडत गेले. पुढे अनुकूलन प्रक्रियेद्वारे सरपटणाऱ्या जीवांनी पाण्यातून पृथ्वीवर पदार्पण करण्याचे धाडस केले. काहींनी अवकाशात भरारी घेतली. त्यातूनच जल, पृथ्वी आणि आकाश व्यापून टाकणारी जीवसृष्टी तयार झाली. हे सगळे ४.५ ते २.५ अब्ज वर्षात घडले.

पृथ्वीवरील पहिल्या जीवाची माहिती घेण्यासाठी महान शास्त्रज्ञ लुईस पाश्चर यांचा ‘बायोजेनेसिस’चा सिद्धांत महत्वाचा ठरतो. या सिद्धांतानुसार जीवापासूनच जीवाची निर्मिती होते. अजैविक घटकांपासून किंवा दैवी चमत्कारातून जीवाची निर्मिती कदापीही शक्य नाही. पाश्चर हा सिद्धांत मांडत असतानाच “Life comes from life is true, within the known History of Earth’ हे त्यांचे विधान काळाच्या पुढे नेणारे होते. या विधानाप्रमाणे बायोजेनेसिसचा सिद्धांत मानवाला पृथ्वीच्या ज्ञात असलेल्या इतिहासापर्यंतच लागू पडतो. यामुळे त्या पूर्वी काय झाले असावे? पृथ्वीवर पहिला जीव कसा निर्माण झाला, याबाबत अगदी २१ व्या शतकापर्यंत गूढ कायम आहे. त्यातूनच मग धर्ममार्तंडांनी ईश्वरी संकल्पनेचा आधार घेऊन विश्वनिर्मिती व जीवनिर्मितीच्या सिद्धांताला अगदीच सोपे करून टाकले. कोणी प्रेषित तर कोणी देवदेवतांचा घाट घातला. त्यातून पुराणकथा जन्माला आल्या. आताच्या विज्ञानयुगातही या संकल्पनांचे जाळे एवढे घट्ट आहे की, त्यातूनच अंधश्रद्धांना खतपाणी मिळतेय.

मग पृथ्वीवरील पहिला जीव कोणता? याचे उत्तर शोधताना आतापर्यंत दोनच गोष्टींवरती शास्त्रज्ञांचे मतैक्य झालेले आहे. एक म्हणजे कार्बन. कार्बन हा पृथ्वीवरील जीवाचा मूलाधार आहे. तर दुसरी बाब म्हणजे, स्वत:चीच प्रत (Self Replication) निमार्ण करण्याची क्षमता असलेला रेणू हा एका १०० ते १५० अॅमिनो अॅसिड्सच्या श्रृंखलेच्या रूपातील पॉलिमर असावा. तिसरा आणखी एक सशक्त मतप्रवाह वर्षानवर्षे शास्त्रज्ञांना विचार करण्यास भाग पाडतो. तो म्हणजे, माणूस पृथ्वीवर उपरा असणे. परग्रहावरून आलेल्या जीवाचे बीजारोपण झाले आणि त्यातून आजच्या मानवाची निर्मिती झाली. अंटार्क्टिकावर सापडलेल्या मंगळावरील अश्नीमुळे मानव हा मंगळाचा निवासी असावा आणि नंतर पृथ्वीच्या मातीत रूजला, असा सिद्धांतही मांडला जातो. याबाबत अनेक पुस्तके लिहिली गेली आहे आणि हॉलिवूडपटही प्रदर्शित झाले आहेत. आता मानव मंगळावर कायमची वस्ती करण्यास सज्ज झाला आहे. तरी हे गूढ पूर्णपणे उलगडलेले नाही. यापूर्वी डॉ.सुरेशचंद्र नाडकर्णी यांनी ‘पृथ्वीवर माणूस उपराच!’ आणि ‘अज्ञाताचे विज्ञान’ तर बाळ भागवत यांनी ‘देव? छे! परग्रहावरील अंतराळवीर!’ अशा पुस्तकातून पृथ्वीवरील जीवाचे रहस्य उलगडण्याचा प्रयत्न केला आहे. डॉ.रंजन गर्गे यांचे पुस्तक पहिल्या जीवाच्या उत्पत्तीचे विज्ञान रंजक पद्धतीने सांगत जाते.

विज्ञानातील इंग्रजीतल्या टर्मिनॉलॉजीला मराठीत अचूक शब्द सापडत नाही. यामुळे विज्ञान विषयावरील लिखाण बऱ्याचदा शैक्षणिक अंगाने जाण्याची भीती असते. प्रादेशिक भाषेत ही शक्यता अधिक असते. मात्र, डॉ.गर्गे हे राज्य मराठी विकास संस्थेचे विज्ञान सदस्य आहेत. शिवाय ते राज्य मराठी विश्वकोष निर्मिती मंडळात सूक्ष्मजीवशास्त्र ज्ञान मंडळाचे अध्यक्ष म्हणूनही कार्यरत आहेत. यामुळे पुस्तक अधिकाधिक सोप्या आणि सर्वसामान्यांना समजेल अशा भाषेत लिहिण्यात त्यांना यश आले आहे. अखेरीस त्यांनी स्पष्टीकरण कोष दिला असून यात इंग्रजी शब्दाचा मराठी अर्थ, व्याख्या मांडल्या आहेत, हे या पुस्तकाचे वैशिष्ट म्हणावे.

पुस्तकाचे नाव : पृथ्वीवर पहिल्या जीवाचा अवतार
लेखक : डॉ.रंजन गर्गे
प्रकाशक : परम मित्र प्रकाशन, ठाणे
पृष्ठ : १४८, मूल्य : २०० रुपये
अश्मयुग :


मानवी इतिहासातील अतिप्राचीन कालखंड. हा सु. पाच लाख ते दहा हजार वर्षापूर्वीपर्यंत साधारणत: मानण्यात येतो. सर्वसाधारणपणे माणसाला लेखनकला अवगत होण्यापूर्वीच्या इतिहासास प्रागितिहास म्हणतात. प्रागैतिहासिक काळापैकी एका सांस्कृतिक अवस्थेस, म्हणजे जेव्हा प्रामुख्याने दगडाचाच उपयोग हत्यारांसाठी केला जात होता त्या काळास ‘अश्मयुग’ असे म्हटले जाते. यात मानवास कोणताही धातू व धातूचा जाणीवपूर्वक उपयोग माहीत नव्हता. प्रागितिहासाचा जवळजवळ चारपंचमांश भाग अश्मयुगानेच व्यापला आहे. अश्मयुगातील मानव त्याच्या भोवती असणाऱ्या लाकडे, हाडे, दगड इत्यादींचा उपकरणे व हत्यारे बनविण्यासाठी उपयोग करीत होता. त्यांपैकी लाकूड व हाडे सहज नाश पावणारी असल्याने या पदार्थांची आयुधे वा उपकरणे मानवी वस्त्यांच्या अवशेषांत सहसा आढळत नाहीत. मात्र दगड टिकाऊ असल्याने त्याची उपकरणे व आयुधे पुष्कळ सापडतात. यावरूनच या कालखंडास ‘अश्मयुग’ असे नाव देण्यात येते.

अश्मयुगातील माणूस सर्वत्र एकाच प्रकारची आयुधे वापरीत होता किंवा एकाच पद्धतीचे जीवन व्यतीत करीत होता असे समजणे चुकीचे ठरेल. स्थलकालपरत्वे वेग व दिशा भिन्न असल्या तरी त्याच्या जीवनात प्रगती निश्चितच होती. ही मानवी प्रगती दर्शविण्यासाठी अश्मयुगाचे पुराणाश्मयुग, मध्याश्मयुग किंवा आंतराश्मयुग आणि नवाश्मयुग असे तीन मुख्य टप्पे कल्पिण्यात आले आहेत. त्यांतही पुराणाश्मयुगाचे पूर्व- पुराणाश्मयुग, मध्यपुराणाश्मयुग आणि उत्तरपुराणाश्मयुग असे पुन्हा तीन उपविभाग पाडले आहेत. या सर्व संज्ञा मुख्यतः यूरोपातील संशोधनांतून उत्पन्न झाल्या. इतर खंडांत प्रागैतिहासिक संशोधनाचा विकास सुरू झाल्यावर असे दिसू लागले, की तेथील प्रगतीची स्तबके काहीशी भिन्न असून वरील संज्ञा त्यांना चपखलपणे लागू पडत नाहीत. नवाश्मयुगापूर्वी पूर्व, मध्य व उत्तर अशी तीनच अश्मयुगे कल्पावी असे आफ्रिका, अमेरिका व भारत येथील काही पुरातत्त्वज्ञ समजत. परंतु स्थलविशेषामुळे उत्पन्न झालेल्या पारिभाषिक संज्ञांचा आशय अद्यापही निश्चित झालेला नाही. म्हणून सर्वत्र यूरोपीय संज्ञाच वापरण्यात आल्या आहेत.

अश्मयुगाच्या उपर्युक्त विभागांची सांस्कृतिक वैशिष्ट्ये स्थूलमानाने पुढीलप्रमाणे होत. यांच्या कालमर्यादांत स्थलभेदानुसार फरक आहेत.

अश्मयुगीन कालखंड

पूर्वपुराणाश्मयुग : याचा काळ सामान्यपणे पाच लाख ते दीड लाख वर्षांपूर्वीपर्यंतचा समजण्यात येतो. काही भूप्रदेशांत दहा हजार वर्षांपूर्वीपर्यंत हीच सांस्कृतिक अवस्था चालू होती. या काळात ग्युंझचा (पहिल्या हिमयुगाचा) आरंभ, येथपासून ते रिसच्या (तिसऱ्या हिमयुगाच्या) पहिल्या चरणापर्यंतचा भूस्तरीय काळ समाविष्ट होतो. अत्यंत कडाक्याची थंडी आणि तीव्र उष्णता असे विषम हवामान आणि तेही वारंवार बदलणारे, त्यामुळे पृथ्वीवरील वनस्पतिजीवनात मोठे फेरफार होत गेले. वृक्षराजी, दाट जंगले व गवताळ प्रदेश यांचे पट्टे उत्तर-दक्षिण असे सरकत राहिले. त्यामुळे जीवसृष्टीही बदलत गेली. आता नष्ट झालेले, सरळ दातांचे भीमगज व तत्सम इतर प्राणी, तसेच पाणघोडे, गेंडे, अस्वले, गवे, सांबरे, घोडे, हरणे असे कितीतरी प्राणी मानवाच्या अवतीभोवती वावरत होते. या प्राण्यांची शिकार हेच प्रमुख उपजीविकेचे साधन होते. वंशशास्त्रदृष्ट्या ज्याचा उल्लेख करता येणार नाही, पण तत्सदृश असे ऑस्ट्रेलोपिथेकस (Australopithecus), पिथेकॅन्थ्रापस (Pithecanthropus) व निअँडरथल (Neanderthal) हे मानवसदृश प्राणी पृथ्वीवर वावरत होते. पण त्यांचा वावर भूपृष्ठाच्या एकपंचमांश क्षेत्रापुरताच मर्यादित होता. अमेरिका व ऑस्ट्रेलिया या खंडांत जवळजवळ वस्ती नव्हतीच. सांस्कृतिक दृष्ट्या या माणसांचे पाच गट पाडण्यात येतात. ते असे : व्हिलाफ्रांकिअन (Villafranchian)–पहिल्या हिमयुगाच्या पहिल्या चरणात अबेव्हिलिअन (Abbevillian)–पहिल्या आंतरहिमयुगाच्या पहिल्या चरणात क्लॅक्टोनियन (Clactonian)–पहिल्या आंतरहिमयुगाच्या दुसऱ्या व तिसऱ्या चरणांत अश्यूलियन (Acheulian)–दुसऱ्या आंतरहिमयुगाच्या प्रथमार्धात व लेव्हालेइशियन (Levalloisian)–दुसऱ्या आंतरहिमयुगाच्या उत्तरार्धापासून पुढे. तंत्रविशेषां- वरून समजांचे वरील गट पाडण्यात आले आहेत. त्यामध्ये वांशिक भेद अभिप्रेत नाहीत. पूर्वपुराणाश्मयुगातील दगडी आयुधांत प्रामुख्याने तीन तंत्रे वा तंत्रप्रकार दिसतात. पहिला हातकुऱ्हाडीचा असून त्यात गोट्याच्या दोन्ही बाजूंचे टवके उडवून हत्यारे करण्यात येत. यांत बदामी आकाराचे टोकदार हत्यार हे प्रमुख होते. यावरूनच त्यास हातकुऱ्हाडतंत्र हे नाव पडले. दुसरा प्रकार म्हणजे कोयत्यासारखे किंवा खाटकाच्या सुऱ्या- सारखे तुकडे तोडणारे दगड व तत्सम हत्यारे निर्माण करण्याचे तंत्र होय आणि तिसरा प्रकार दगडी छिलक्यांपासून वरील दोन्ही प्रकारची उपकरणे तयार करणे हा होता. पहिल्या प्रकारचे तंत्र यूरोप, आफ्रिका, पश्चिम आशिया येथे, तर दुसरे तंत्र चीन व आग्नेय आशिया यांत आढळते आणि तिसरे तंत्र प्रथम पॅलेस्टाइन व पुढे वायव्य भारतात दिसते. कालांतराने ते इतरत्रही पसरले.

मध्यपुराणाश्मयुग: यात पन्नास हजार ते पंचवीस हजार वर्षांपूर्वीचा सर्वसाधारण काळ येतो. तिसऱ्या आंतरहिमयुगाचा उत्तरार्ध आणि व्यूर्मची ( Wurm–चौथ्या हिमयुगाची ) सुरुवात, हे काळ ह्यात समाविष्ट होतात. ह्या काळातील हवामान अतिशीत असल्यामुळे क्वचित अधूनमधून जंगले आढळत. मात्र ह्या काळात उत्तर यूरोपात खुरट्या वनस्पतींचा प्रदेश होता. त्यात गुहांच्या आश्रयाने राहणारे केसाळ गवे, अस्वले, रान- बैल व गेंडे हे मुख्य प्राणी असत. या काळात यूरोप व पश्चिम आशिया या भागांत निअँडरथल मानवाची वस्ती होती. तो मुख्यत्वे गुहांतून वा प्रस्तरालयांतून राहत असे. त्यांतील काही गुहांतून चित्रकाम सापडले आहे. मौस्टेरियन (यूरोप) व लीव्हाल्लॉइसो-मौस्टेरियन (पश्चिम आशिया) हे ह्या काळातील दोन प्रमुख समाजगट होत. त्यांची हत्यारे लहान आकाराची, वाटोळी पण धारदार आणि वैशिष्ट्यपूर्ण होती. ती गोरगोटी दगडांच्या छिलक्यांची केलेली असत. ह्याशिवाय इतर उपकरणांत तासण्या, टोचे, बाणांच्या टोकासारखे लहान हत्यार यांचाही समावेश असे.

उत्तरपुराणाश्मयुग : हा काळ सर्वसाधारणपणे पंचवीस हजार ते दहा वर्षांपूर्वीपर्यंतचा समजण्यात येतो. या काळाचा आरंभ चाळीस हजार वर्षांपूर्वी झाला असावा, असेही एक मत प्रसृत आहे. यूरोपपुरता हा काळ निश्चित असून, चौथ्या हिमयुगात जी तीन हिमप्रसरणे झाली त्यांतील पहिल्या व दुसऱ्या प्रसरणांच्या मधल्या काळात मध्य यूरोप वा दक्षिण रशिया येथे याचा उदय झाला. ह्या काळातील हवा थंड असल्याने या भागातही खुरट्या वनस्पती आढळत. रेनडिअरसारख्या प्राण्यांचे कळप त्यामुळे सर्वत्र वावरत होते. तसेच भीमगजा- सारखे काही काही प्राणी दक्षिण यूरोपात होते. वंशशास्त्रज्ञ ज्याला ‘होमो सॅपियन’ असे नाव देतात त्याच्या क्रोमॅग्नन व कोम्ब कापेल ब्रून मानव ह्या दोन शाखा यूरोपात सर्वत्र पसरल्या होत्या. होमो सॅपियनला पूर्णार्थाने मानव समजण्यात येते. पश्चिम आशियातही ही संस्कृती दिसून येते. इतर खंडांतील या संस्कृतीचे अस्तित्व व स्वरूप याबाबत तज्ञांत एकमत नाही. पेरीगोर्डियन किंवा ऑरिग्नेशियन, सॉल्यूट्रीअन, मग्डलेनिअन हे मुख्य समाजगट त्या वेळी अस्तित्वात होते. नैसर्गिक गुहांचा निवासासाठी मोठ्या प्रमाणावर वापर केला जाई. त्यांत काही ठिकाणी चित्रकाम आढळले आहे. पारलौकिक जीवन आणि अतिमानुषी शक्ती यांसंबंधी येथे विचार असावा इतका पुरावा मृतात्म्यासंबंधीची थडगी व विधी ह्यांमधून ज्ञात होतो. गारगोटीच्या दगडाची पातळ व सरळ पाती असलेली संयुक्त आयुधे बनविण्यात येऊ लागली. पानाच्या आकाराची बाणाची टोके, तासण्या, टोचे (Awl-Burin) ही विशिष्ट आयुधेही ह्या काळात वापरात होती. लाकूड व शिंगे यांचाही हत्यारांच्या निर्मितीसाठी वाढता उपयोग करण्यात येऊ लागला होता.

आंतराश्मयुग : ह्याचा पंधरा हजार वर्षांपूर्वी आरंभ होऊन दहा हजार वर्षांपूर्वी त्याचे पूर्ण प्रगल्भावस्थेत रूपांतर झाले. तथापि त्याचे अस्तित्व अत्यंत मर्यादित होते. चौथ्या हिमयुगाच्या तिसऱ्या प्रसरणाच्या काळात ह्यास सुरुवात झाली. थंड हवेऐवजी पर्जन्यमानात हळूहळू वृद्धी होऊ लागली व त्यामुळे गवताळ जंगलांची वाढ झाली आणि जीवसृष्टी सध्यासारखी निर्माण झाली. क्रोमॅग्‍नन मानवाच्या वंशाचा सर्वत्र प्रसार झाला. त्याविषयीचा पुरावा यूरोप व पश्चिम आशिया या भागांत प्रामुख्याने आढळतो. इतर खंडांतील या विशिष्ट सांस्कृतिक स्तबकाचे स्वरूप व विस्तार यांविषयी फारशी माहिती ज्ञात नाही. अझिलियन, टार्डेनोइशिअन, ॲस्टुरियन, एर्टेबोल, पॅलेस्टाइन (यूरोप) नाटुफियन (उत्तर ईजिप्त) हे प्रमुख समाजगट येथे होत. मुख्यत: हे उघड्यावर वा तळ्यांच्या काठी कातडी तंबूंतून निवास करीत. मात्र त्यांपैकी काही गुहांतही राहत असावेत. काही भागांत जमिनीत बोगद्यासारखे खड्डे करून त्यांचा त्यांनी राहण्यासाठी उपयोग केला होता. ‘सूक्ष्मपाषण’ नावाने ओळखली जाणारी गारगोटीच्या दगडाची त्रिकोण, चंद्रकोर इ. विविध आकारांची पाती वापरून ते संयुक्त हत्यारे बनवीत. मांस व आपोआप उगवणाऱ्या धान्याचेही ते भक्षण करीत. ह्या काळात प्राणी माणसाळविण्यास आरंभ झाला असावा.

नवाश्मयुग : ह्या काळास इ.स.पू. आठ हजारांच्या पुढे आरंभ झाला. इ.स.पू. पाच हजारांच्या आसपास त्याची विशेष प्रगती झाली. त्या वेळी हवामान, प्राणी व वनस्पतिसृष्टी सध्यासारखीच होती. मानववंशही बहुधा आज असणारेच होते. बारीक दगडी पात्यांची उपकरणे, घासून गुळगुळीत व धारदार केलेल्या दगडी कुऱ्हाडी, छिन्न्या यांची निर्मिती व वापर ह्या काळात होऊ लागला. चीन व आग्नेय आशिया या भागांतील हत्यारांचे आकार भिन्न आहेत. या भागातील नवाश्मयुगीन संस्कृतीही अनेक दृष्ट्या पश्चिमेकडील तत्कालीन संस्कृतीपेक्षा भिन्न आहे. या वेळी गाय, बैल, डुक्कर, मेंढी व शेवटी शेवटी घोडा हे प्राणी माणसाळले होते. पशुपालन हा महत्त्वाचा व्यवसाय सुरू झाला होता. याबरोबरच धान्य पिकविण्याची विद्या मानवाला साध्य झाली असावी. या व्यवसायाचा आरंभ पॅलेस्टाइनमध्ये झाला असावा. कारण आतापर्यंत हाती आलेले याबाबतचे सर्वांत प्राचीन नवाश्मयुगीन अवशेष या भागातीलच आहेत. मानवास शेतीसाठी बराच काळपर्यंत एकाच ठिकाणी राहण्याची जरूर भासू लागली आणि त्यामुळे उपजीविकेला एक प्रकारची शाश्वती आली. म्हणून स्थिर स्वरूपाच्या वसाहतींना प्रारंभ होऊन पहिली खेडी निर्माण झाली. गवत, लाकूड, कच्च्या विटा, दगड यांनी ही घरे बांधलेली असत. काही भागांत (पूर्व आशिया) भूमिगत घरांचाही वापर होता. शेकडो वर्षांच्या वाटचालीतून ह्या स्थिरपद जीवनाचा लाभ झाला. त्या पायावरच नागरी संस्कृतीची कालांतराने उभारणी झाली. धातूंचा शोध लागल्यावर वरील प्रक्रियेला गती मिळाली आणि अश्मयुगाचा अस्तही होऊ लागला. अश्मयुगाचा अस्त प्रथम इ.स.पू. ३०००च्या सुमारास मेसोपोटेमिया व ईजिप्त या ठिकाणी झाला.

मानवी जीवन

अन्न : मानवी जीविताच्या आद्य निकडींपैकी पहिली अन्न होय. अश्मयुगापैकी पहिल्या दोन खंडांतील मानवाचे मुख्य अन्न म्हणजे त्याच्या भोवताली वावरणारे प्राणी, थोड्याफार प्रमाणात फळेमुळे-वनस्पती. आपले भक्ष्य मिळविण्यासाठी मानवाला त्याच्या शरीरशक्तीपेक्षा बुद्धिबलाचा अधिक वापर करणे भाग होते. कारण भोवतालचे बहुतेक सर्व प्राणी त्याच्यापेक्षा ताकदवान, चपळ होते किंवा त्यांना निसर्गाकडून मिळालेली स्वरक्षणाची साधने मानवाला दूर ठेवण्यास पुरेशी होती. अशा स्थितीत माणसाने टाकलेले पहिले पाऊल म्हणजे गटागटाने शिकार करणे हे होय. अश्मयुगीन मानव ताकदीत भारी असणारा प्राणी कोंडीत पकडून त्यास दगड-धोंड्यांनी ठेचून मारी. पूर्वपुराणाश्मयुगात प्रचंड गवे व गेंडे अशा प्राण्यांना खड्ड्यात फसवून मारण्याची विद्या मानवाने हस्तगत केली होती. असे खड्डे व त्यांत फसलेल्या प्राण्यांची हाडे यूरोपात मिळाली आहेत. मात्र अग्नीचे ज्ञान झाल्यावर गुहांत विसावणाऱ्या श्वापदांना हुसकून बाहेर काढण्यासाठी त्याचा उपयोग केला जात असे. उत्तरपुराणाश्मयुगात रेनडिअर, सांबर, घोडे अशा वेगवान प्राण्यांचे कळप घेरून उंच अशा कड्याकडे वळविण्यात येत. भेदरलेली ही जनावरे धावण्याच्या वेगात कड्यावरून खाली पडत व तेथे थांबलेल्या शिकाऱ्यांच्या हातात ती अलगद सापडत. सांघिक शक्तीचे हे वेगवेगळे प्रयोग अन्नप्राप्तीच्या कामात माणसाला उपयुक्त ठरले. तद्वतच त्याची स्वत:ची संहारशक्ती नवनव्या आयुधांमुळे वाढत गेली. भाले, बोला, धनुष्यबाण इ. शस्त्रांमुळे स्वत: सुरक्षित राहूनही त्यास जास्त परिणामकारकपणे शिकार मिळवणे शक्य झाले. मच्छीमारीसाठी लहान होडगी आणि बांबूची प्रचंड टोपली यांचा उपयोग मानव आंतराश्मयुगात यूरोपमध्ये करीत होता. हाडांचे गळ, काटेरी बाण यांचाही उपयोग मासे व इतर जलचर प्राणी मारण्यास करण्यात येई.

आंतराश्मयुग व नवाश्मयुग यांच्या संधिकाळात मेंढ्या, गाई व इतर काही प्राणी माणसाळवून पाळण्याची विद्या मानवाने साधली. अशा प्राण्यांचे कळप बाळगण्यात येत व त्यांचा उपयोग प्रामुख्याने भक्षणासाठीच होत असे. पाळण्यात आलेले हे प्राणी तृणभक्षकच होते. त्यामुळे त्यांचे कळप घेऊन चराऊ कुरणांच्या शोधासाठी दूरदूर अंतरावर फिरणे त्यास आवश्यक झाले किंवा वर्षभर चारा असेल अशा ठिकाणी त्यास स्थायिक व्हावे लागले. पशुपालनाची ही अवस्था अगदी प्राथमिक असली, तरी तिची मुख्य फलनिष्पत्ती अन्नाची शाश्वती हीच होय.

याच्याच आसपास केव्हा तरी शेतीचा शोध लागला असावा. आरंभी मुद्दाम पेरण्यात आलेले धान्य म्हणजे गहू असावे. रानटी गव्हाच्या लोंब्या जमिनीवर पडतात, तेथे पुन्हा रोपे उगवतात, तेथेच नवा गहू येतो, हे जीवितचक्र माणसाच्या ध्यानात आले असावे. फळे, कंदमुळे गोळा करण्याचे काम मुख्यत: स्त्रियांकडे आले व हे निसर्गाचे चक्र प्रथम त्यांच्यात लक्षात आले असावे. कदाचित स्त्रियांनीच धान्य पेरण्यास आरंभ केला असावा. हा शेतीचा म्हणजे पर्यायाने नवाश्मयुगाचा आरंभ होय.

शिकार, मच्छीमारी, पशुपालन व नंतर शेती हे अश्मयुगीन माणसाचे क्रमश: मुख्य व्यवसाय होते. पुराणाश्मयुगात व आंतराश्मयुगात मात्र फक्त पहिले दोनच व्यवसाय होते. नवाश्मयुगात पशुपालन व शेती हे प्रधान व्यवसाय झाले, तरीही थोड्याफार प्रमाणात शिकार व मच्छीमारी होतच राहिली. त्याच्या जीविताच्या इतर शाखांचे स्वरूप बऱ्याच अंशी त्याच्या व्यवसायांवरून निश्चित झालेले दिसते.

अश्मयुगाच्या विविध अवस्थांत मानवी अन्नाचे रूपही पालटत गेले. पुराणाश्मयुगीन व आंतराश्मयुगीन माणसाच्या अन्नात सर्व प्रकारच्या लहानमोठ्या प्राण्यांचा आणि फळे व कंदमुळे यांचा समावेश होता. मोसमात व विशिष्ट प्रदेशात सापडणारे सर्व प्रकारचे लहान-मोठे प्राणी खाद्य होते इतकेच काय, फार जरूर वाटल्यास नरमांसभक्षणही होत असे. एरवी हरणे, डुकरे, हत्ती, भीमगज, अस्वले, घोडे हे प्राणी नित्याचे भक्ष्य होते. आंतराश्मयुगात याशिवाय मासे व इतर जलचर यांचा अन्नात समावेश झाला. या युगाच्या शेवटी शेळ्या-मेंढ्या, गायी-बैल यांसारख्या पाळीव जनावरांचे मांस हा आहाराचा एक भाग झाला. नवाश्मयुगात धान्या- बरोबरच मांसाहारही चालूच राहिला.

शेती करण्यास आरंभ झाल्यावर गहू, बार्ली, मका, ज्वारी, बाजरी, राय ही धान्य व वाटाणा, घेवडा, मूग, हरभरा व मसूर यांसारखी द्विदल धान्ये स्थलकालपरत्वे पिकविण्यात येऊ लागली. तेल मिळविण्या- साठी ऑलिव्हसारख्या फळांचा वापर आग्नेय स्पेनमधे होत असे. नासपती, सफरचंद, बोरे अशांसारखी फळेही या माणसाला उपलब्ध होती. पण त्यांची मुद्दाम लागवड केलेली नसे. पाळीव जनावरांत शेळ्या, गाई व डुकरे ही मुख्य असत. यांच्या मांसाचा खाण्यासाठी उपयोग होई. लामा, उंट, घोडा ही इतर पाळीव जनावरे वेळप्रसंगी भक्षणासाठी उपयोगी पडली, तरी मुख्यत्वे त्यांचा उपयोग वाहतुकीसाठीच होत असे.

समाजरचना : अश्मयुगीन समाजरचनेविषयी उत्खननातून मिळणारा पुरावा अप्रत्यक्ष व अल्प आहे. मिळालेल्या अवशेषांवरूनच काही अनुमाने बांधावी लागतात. या अनुमानांना बळकटी आणण्यासाठी, आजच्या मानवसदृश प्राण्यांची वागणूक (गोरिला, चिंपांझी इ.) आणि आजही अत्यंत मागासलेल्या, रानटी परिस्थितीत राहणाऱ्या जमातींविषयीची माहिती यांचा उपयोग करून घ्यावा लागतो. हे सगळे करूनही अश्मयुगीन समाजव्यवस्थेसंबंधी अत्यंत त्रुटित अशीच माहिती उपलब्ध होते.

आधीच हे स्पष्ट करावयास पाहिजे, की वैचारिक देवघेवीचे मुख्य साधन जी भाषा, ती त्या कालखंडात केव्हा व कोणाकोणाला प्राप्त झाली होती, याविषयी काहीही निश्चित सांगता येत नाही. परंतु पूर्वविचार व योजना, तसेच पुरस्सर सामूहिक जीवन प्रचलित होते. त्यावरून असे काहीतरी माध्यम अस्तित्वात असावे हे नक्की. शिकार करणे हे एकट्या-दुकट्याचे काम नसून त्यासाठी सांघिक प्रयत्न जरूर होते. तेव्हा पहिल्या- पासूनच मानवाला गटात किंवा टोळीत राहावे लागले आहे. या गटास कोठल्या माणसांचा समावेश होत असावा व या गटाची रचना कशी असावी, हे प्रश्न विवाद्य आहेत. केवळ मूळ उद्देशाकडे लक्ष ठेवून विचार केला, तर कोणाही धडधाकट माणसाचा त्यात समावेश व्हावा व सगळ्यांत अनुभवी शिकाऱ्याच्या हुकमात सगळ्यांनी चालावे, ही सरळ उत्तरे आहेत. पण मानवी जीवनातील कोणताच प्रश्न इतका सरळ सुटत नाही. केवळ एखाद्या मोठ्या शिकारीला वा शिकारीच्या एखाद्या मोसमात माणसे एकत्र येण्याऐवजी काही शाश्वत असे ऐक्य आरंभापासून अधिक प्रचलित असावे व हे ऐक्य सामाजिक बंधासारखे असावे. रक्ताचे नाते असणारी माणसे एकेका गटात असावी आणि हा कौटुंबिक गट असावा. पण या वेळी ‘कुटुंब’ याचा नेमका काय अर्थ असावा, याचा उलगडा होत नाही. यात एकाच पित्याची प्रजा होती, की एकाच मातेची प्रजा होती? अश्म- युगीन स्त्रीमूर्ती व चित्रे यांवरून काही तज्ञ असा निष्कर्ष काढतात, की येथे मातृसावर्ण्य होते. अपत्यप्राप्तीतील मातेच्या कार्याची साक्षात कल्पना या समाजाला होती. परंतु इतर अनेक मागासलेल्या समाजांप्रमाणे, प्रजोत्पादनातील पुरुषाचा नेमका वाटा कोणता? याची कल्पना अश्मयुगीन समाजाला नसावी. म्हणून मातेला, म्हणजे स्त्रीला, अधिक महत्त्व असावे. या प्रश्नाची दुसरी बाजू अशी, की या समाजातील स्त्रीपुरुष- संबंधाविषयीही कसलीच माहिती उपलब्ध नाही. कदाचित आजही जे प्राणिसृष्टीत दिसते, त्याप्रमाणे त्या वेळी एक बलिष्ठ पुरुष असावा. त्याच्या चारपाच स्त्रिया व बाल्यावस्थेतील अपत्ये एवढ्यांचा कुटुंबात समावेश असणे स्वाभाविक होतो. नव्याने वयात येणाऱ्या स्त्रीपुरुषांना–विशेषत: पुरुषांना –या व्यवस्थेत सामावून घेणे हा नेहमीचा प्रश्न राहणार. मग हे तरुण, आपल्या अथवा शेजारच्या कुटुंबातील स्त्रियांना वश करून घेऊन, स्वतंत्र कुटुंबे स्थापतील. म्हणजे पितृ-किंवा मातृ-सावर्ण्य यांपैकी कोणतीही पद्धत प्रचलित असू शकेल. अशी कुटुंबे एकत्र येऊन त्यांचा पुढे गट निर्माण होत असे. व्यावहारिक गरज व स्त्रीपुरुषसंबंध या दोन्हींची अशी सांगड घातली जात असणे सुसंगत व संभाव्य ठरते. या एकेका गटाचे सर्व घटक तेथे असतीलच असे म्हणवत नाही. तथापि एखाद्या विशिष्ट प्रदेशात राहणारी काही कुटुंबे व्यावहारिक सोयींसाठी एकत्र गट करीत असतील. या गटाचे निष्ठास्थान रक्तसंबंध नसल्याने काही दृश्य चिन्ह असणे उपकारक ठरेल, म्हणून एखाद्या प्राण्याचा किंवा पक्ष्याचा, निशाणी वा गणचिन्ह म्हणून उपयोग होऊ लागला. गुहांच्या भिंतींवर अस्वले, गेंडे अशा प्राण्यांची जी चित्रे दिसतात ती गणचिन्हेच समजता येतील. अशा गटात तीसपासून साठापर्यंत माणसे असावीत. ही सगळी एकत्र राहत, तसेच त्यांचे खाणेपिणेही एकत्रच होत असे. शिकारीसाठी म्हणून एखादा विशिष्ट भूप्रदेश एकेका गटाने राखून ठेवलेला असण्याची शक्यता असावी.

गटातील माणसे कोणती कामे करीत होती, याचे अगदी स्थूलमानाने विवेचन करता येईल. शिकार हा प्रमुख व्यवसाय पुरुषमंडळी करीत, तर फळे, मुळे, कंद हे गोळा करण्याचे काम स्त्रिया व मुले यांजकडे असे. मांस भाजून खाण्यास आरंभ झाल्यावर तेही स्त्रियांचेचे काम झाले असावे. स्त्रीचे सगळ्यात महत्त्वाचे कार्य बालसंगोपन हे होय. मानवी अपत्य दोनतीन वर्ष पूर्णपणे परावलंबी असते हे ध्यानात घेतले म्हणजे बाल- संगोपनात स्त्रीला लागणाऱ्या वेळाची व श्रमाची सार्थ कल्पना येईल. दगडी हत्यारे व उपकरणे तयार करणे हे काम पुरुषांचे होते. पंचमहाभूते, वृक्ष, स्थलदेवता, मृतात्मे यांसारख्या अतिमानुषी शक्तींवर ताबा चालविणाऱ्या पुरोहिताचा व्यवसाय गटाचा नायक किंवा वयोवृद्ध स्त्री वा पुरुष यांपैकी कोणीही करीत असे.

उत्तरपुराणयुगातील व आंतराश्मयुगातील गुहांच्या भिंतींवरील चित्रे, त्यांत सापडणाऱ्या स्त्रीमूर्ती, हाडे व शिगें यांवरील कोरीवकाम, अशा कलावस्तूंची निर्मिती हा या कालखंडात प्रचलित झालेला आणखी एक व्यवसाय होय. यांतील बरीच चित्रे व मूर्ती धार्मिक विधींशी निगडित होत्या. तेव्हा त्यांची निर्मिती करणारी माणसे अर्थातच समाजाने पोसलेली असावीत, असे दिसते. याच काळात हत्यारांसाठी गारगोटीसारखे दगड वापरू लागले. हे दगड निरनिराळ्या गटांना पुरविणे हाही एक स्वतंत्र व्यवसाय उदयास आला असावा. उत्तरपुराणाश्मयुगीन व आंतराश्मयुगीन हत्यारे आकाराने लहान पण वैविध्यपूर्ण होती. ती तयार करण्यास विशेष कौशल्याची आवश्यकता असल्याने अशा कारागिरांना साहजिकच गटात स्वतंत्र स्थान व महत्त्व प्राप्त झाले असावे.

एकीकडे रक्तसंबंध आणि व्यावहारिक गरज यांमुळे निर्माण होणारे ऐक्य, दुसरीकडे स्त्रीपुरुषसंबंधातून उत्पन्न होणारे व व्यवसायप्रावीण्यापोटी उद्भवलेले ताण, यांच्या संघर्षातून समाजगट टिकविण्याची व्यवस्था काय असावी? या संदर्भात व्यवहारचातुर्य व औदार्य यांच्या जोडीला दंडशक्तीचीही गरज असली पाहिजे. ह्या दंडशक्तीचा वापर करण्याचे काम पुरोहिताकडे असावे. अतिमानुषी शक्तीवरील श्रद्धेचा उपयोग सामाजिक ऐक्य टिकविण्यास होत असे. याला परंपरा व रूढी यांचा चांगलाच आधार मिळत असावा.

नवाश्मयुगात उपजीविकेच्या साधनांत मूलभूत क्रांती घडून आली. पशुपालन अथवा शेती यांमार्गे होणारी अन्नप्राप्ती आणि शिकारीतून होणारी प्राप्ती यांत एक फार महत्त्वाचा फरक आहे. या भेदाचे परिणाम दूरगामी ठरले. शिकार मिळविण्यास फार तर एकदोन किंवा तीनचार दिवस जात, परंतु एकदा मेलेला प्राणी हाताशी आला, की लगेच खाता येई शिकार करणे हे काम सतत चालू असले, तरी त्यातून फलप्राप्ती जवळजवळ तत्काळ होत असे. आता मेंढ्या वा गुरांचे कळप बाळगावयाचे म्हणजे, गुरे वाढवावयास हवीत. शेतात धान्य पेरल्यानंतर प्रत्यक्ष धान्य हाती येईपर्यंत तीन ते सहा महिने इतका काळ वाट पाहत बसावयास पाहिजे. तसेच धान्य पेरण्याच्या आधी त्या जमिनीची मशागत केली पाहिजे. माणसाचे अवधान सतत त्याच गुरांच्या कळपावर पाहिजे, त्याच जमिनीच्या तुकड्यावर पाहिजे. यामुळे अधिकाधिक आपुलकी निर्माण झाली व तिचेच रूपांतर स्वामित्वाच्या भावनेत झाले. याचीच दुसरी बाजू अशी, की कळपातील गुरांपासून अन्न मिळणार ते त्यांची जोपासना करणाऱ्याला–दुसऱ्याला नव्हे. म्हणजे उपजीविकेच्या साधनांवर मालकी हक्काचा उदय झाला. आरंभी ही मालकी प्रत्येक गटाची सामूहिक होती. नंतर कुटुंब हा महत्त्वाचा दुवा झाला आणि शेवटी तेथे व्यक्ती आली. एकेका व्यकीच्या मालकीचे कळप किंवा शेतजमीन या वेळी नव्हती पण एकेका कुटुंबाच्या सर्वस्वी मालकीची स्थापना मात्र झालेली दिसते. याचे साधे कारण असे, की कोणाही व्यक्तीला अधिकार आणि कर्तव्य यांची सर्वांत फायदेशीर जोड कुटुंब या समूहाद्वारेच मिळण्यासारखी होती. जमिनी वर्षानुवर्षे टिकवून धरावयाच्या याचाच अर्थ वारसा म्हणून त्या मिळावयाच्या, तर तो अधिकार कोणाचा हे स्पष्ट करणे म्हणजे कुटुंब या संस्थेचे रूप नक्की ठरणे आवश्यक होते. नवाश्मयुगाच्या आरंभीच्या काळात पितृसावर्ण्य रूढ झाले. आता पुराणाश्मयुग व आंतराश्मयुग यांतल्यासारखी स्थिती राहिली नाही. या कालखंडातील माणसाला एकाच ठिकाणी स्थायिक होणे अत्यावश्यक झाले. केवळ पशुपालन व मेंढपाळी करणाऱ्या लोकांना चराऊ कुरणाच्या शोधार्थ थोडीशी भ्रमंती करावी लागत असली, तरी पशुपालन व शेती असे दोन्ही व्यवसाय करणारे लोक कायमचे एकत्र राहू लागले.

दगडाची हत्यारे करणे, त्याला आवश्यक ते दगडाचे प्रकार मिळविणे, थोड्याफार प्रमाणात शिकार करणे, तसेच पौरोहित्य, कलाकृती हे सर्व व्यवसाय पूर्वीप्रमाणेच आताही चालू राहिले. मात्र शेतकी आणि पशुपालन यांसंबंधीची तंत्रे अंगी आणणे जरुरीचे झाले. हेच सर्वसाधारण व्यवसाय असल्याने बहुतेक स्त्रीपुरुष यांत तरबेज झाले. आता नवीन व्यवसाय आले. घरे बांधणे, त्यासाठी सुतारकाम-गवंडीकाम आले वस्त्रे विणणे आणि नवाश्मयुगाच्या उत्तरार्धात मृत्पात्रे तयार करणे ह्याही गोष्टी आल्या. यांतील वेतकाम, बुरूडकाम यांसारखे काही पूर्वापार व्यवसाय होते. त्यांत वस्त्रे विणणे याची भर पडली. मृत्पात्रे तयार करणे, ती रंगविणे हे व्यवसाय स्त्रियाही करीत. सर्व लोक निरनिराळे व्यवसाय करीत होते. पण निरनिराळ्या उत्पादनांची गुणवत्ता पाहिल्यानंतर असे वाटते, की प्रावीण्य मिळविलेल्या माणसांचेच हे काम असले पाहिजे. म्हणजे व्यवसाय व त्यातील प्रावीण्य यांच्या अनुषंगाने समाजाची व्यावसायिक विभागणी झाली होती. असे कुशल कारागीर एकाच गावात राहत की इतर गावांत काम करीत, हे ज्ञात नाही. परंतु व्यावहारिक सोयीच्या दृष्टीने पाहिल्यास ते फिरते असण्याचा अधिक संभव वाटतो. फिरत्या कारागिरांच्या पाठोपाठ फिरते व्यापारीही आले असावेत. इतकी कुटुंबे कायमची एकत्र राहू लागली. गुरेढोरे, शेतजमिनी यांवर कौटुंबिक (खाजगी) मालकी निर्माण झाली. तंत्रज्ञांमुळे काही व्यवसायांवर एखाद्या कुटुंबाची वा माणसाची मक्तेदारी आली. म्हणजे साहजिकच संघर्ष-प्रसंगांची शक्यता वाढली. आतापर्यंत सामाजिक संघर्षाला पोषक असे घटक अश्मयुगीन समाजात नव्हते. अतिमानुषी शक्तीवर श्रद्धा, मृतात्मे, पुरोहित, वडीलधारी माणसे, परंपरा यांचे समाजावर नियंत्रण होतेच. परंतु आता दंडनीती आणि शासनसंख्या अत्यावश्यक झाली. याच संस्थेकडे समाजाचे व त्याच्या मालमत्तेचे बाह्यशत्रूकडून रक्षण करण्याचे दायित्वही आपोआप आले. अशी संस्था कोणत्याही स्वरूपाची असेल त्यावर वडिलधाऱ्या मंडळीची सभा, एक वयोवृद्ध वा अनुभवी पुढारी-धर्मगुरू (पुरोहित) प्रमुख म्हणून असावा.

शेवटी नवाश्मयुगीन समाज शाश्वत पायावर उभा राहून समाजरचनेत महत्त्वाचे बदल घडले आणि कुटुंब ही संस्था श्रेष्ठ ठरली. यातून नियंत्रणाची गरज निर्माण होऊन शासनसंस्थाही याच काळात उत्पन्न झाली असावी. तिचा आवाका लहान असला, तरी मूलभूत लक्षणे तेथून दृग्गोचर होऊ लागतात. या समाजा- च्या तंत्रज्ञानाविषयी बरीच माहिती उपलब्ध झाली आहे.

वसतिस्थाने : अश्मयुगीन वसाहतींचे स्वरूपही वैविध्यपूर्ण होते. वसाहतींचा विचार करण्यापूर्वी फुटकळ निवासस्थानेच आधी पाहावयास पाहिजेत. निवासस्थानांचे स्वरूप तत्कालीन हवामानावर अवलंबून होते. त्यानुसार सामान्यपणे निवासांचे दोन प्रकार दिसतात. गुंफा वा प्रस्तरालय यांसारखी नैसर्गिक आणि झोपड्या किंवा तंबू यांसारखी कृत्रिम आवरणे निवासासाठी वापरीत. पुराणाश्मयुगातील पहिल्या दोन भागांत हवेतील तपमानाचे चढउतार तीव्र असल्याने, विशेषत: हिवाळा फारच कडक असल्याने, मानवाने गुंफांचा वा थोड्या पुढे झुकणाऱ्या कडेकपाऱ्यांचा आश्रय सर्वत्र केलेला होता. सर्व प्राचीन ज्ञात अशा गुहा चीनच्या जोकोत्येन (Chou-kou-tien) भागातच आढळल्या आहेत. त्यानंतरच्या गुहा यूरोपमधे दक्षिण फ्रान्स व उत्तर स्पेन, आशियात पॅलेस्टाइन व सिरिया आणि आफ्रिकेतील मोरोक्को येथे आढळतात. अल्जिरियाच्या भूमध्य सागरा- नजीकच्या प्रदेशात मध्याश्मयुगातील वस्त्यांचे अवशेष मिळाले आहेत. यांतील काही गुंफांत उत्तरपुराणाश्म- युगात वस्ती झाली, तर काहींत आंतराश्मयुगातही वस्ती होती. भारतातील मध्य प्रदेशातील गुहा आंतराश्म- युगीन आहेत, तर अमेरिकेतील गुहा सांस्कृतिक दृष्ट्या अश्मयुगाच्या विविध टप्प्यांतील आहेत. तरीसुद्धा त्या कालदृष्ट्या नजीकच्या आहेत. पण सर्व गुहांतील किंवा प्रस्तरालयांतील निवासांत काही समान विशेष दिसतात. निवासाला गुहा वा कपाऱ्या निवडताना त्यांची तोंडे वाऱ्याच्या दिशेला येणार नाहीत अशी काळजी घेतली जात असे. गुहांच्या तोंडाशी काही आडोसे असलेच, तरी त्यांविषयी विशेष माहिती मिळत नाही. गुहा बरीच खोल असेल, तर मुखाच्या भागातच वस्ती होई. तथापि फार खोलातली जागा टाळलेली दिसते. या आतल्या भागाचा चित्रकामाला वा काही पूजाअर्चा यांसारख्या विधींना उपयोग होत असावा. त्यांना ‘मंदिरे’ किंवा ‘पूजास्थाने’ अशीही नावे यामुळे दिली जातात. अत्यंत कडाक्याच्या हिवाळ्याला उतार पडल्याबरोबर तळी, नद्या यांच्या काठी माणसे उघड्यावरही राहत असतील, अशा काही ठिकाणी त्यांच्या अस्तित्वाचा निर्णायक पुरावा ⇨ ओल्हुवायी गॉर्ज (आफ्रिका) येथे मिळाला आहे. तेथे त्यांनी काही झोपड्या वा घरे बांधली. याविषयीच्या खाणाखुणांचा मात्र काहीच मागमूस आज लागत नाही. माणसाने उभारलेल्या आसऱ्या- चे स्पष्ट अवशेष उत्तरपुराणाश्मयुगातच प्रथम मिळतात. तेही एका विशिष्ट भागातच आणि एका विशिष्ट समाजगटाशी निगडित आहेत. आग्नेय यूरोपात चेकोस्लोव्हाकियात व्हिस्टोनीस, ऑस्ट्रोव्हा व पेट्रोव्हिज दक्षिण रशियात डॉन नदीवरील गागारिनो येथे व सायबेरियात टिमोनोव्हका येथे हे अवशेष मिळतात. पहिल्या दोघांचा संबंध ग्रेव्हॅटियन लोकांशी आहे आणि भीमगज या अजस्र प्राण्याची शिकार हाच त्यांचा मुख्य व्यवसाय असल्याने या लोकांना त्याच्या पाठोपाठ विरळ जंगलात येऊन राहणे भाग पडले. स्वाभाविकच त्यांनी काही आश्रयस्थाने बांधली. यांना घरे म्हणण्यापेक्षा तंबू वा झोपड्या म्हणणे अधिक सोयीचे ठरेल. वर्तुळाकार वा लंबवर्तुळाकार अशा रचनेच्या या झोपड्या आकाराने पुष्कळच मोठ्या असत (उदा., व्हिस्टोनीस : १५ मी. लांब व ९ मी. रुंद). यांवर झाडाच्या फांद्या तिरप्या एकमेकांना टेकून त्यांवर पाला, गवत वा कातडे पसरण्यात येत असे. जेथे सबंध छप्पर कातडी एकमेकांना जोडून तंबूसारखे करीत, तेथे ताण देण्यासाठी मोठाले घोडे वा भीमगजाचे सुळे त्यांच्या कडेवर ठेवलेले दिसतात. छप्पर जमिनीवरच टेकत असल्याने भिंतीची गरजच नव्हती. परंतु एखाद्या ठिकाणी, विशेषतः जमीन उतरती असल्यास, दगडामातीची लहानशी भिंतही बांधण्याची विद्या त्यांना ज्ञात होती (व्हिस्टोनीस). भोवतालच्या जमिनीपेक्षा घराची जमीन खोलगट असे. जमिनीवर सपाट दगड अंथरून क्वचित फरशीही केलेली दिसते. मध्यभागी ओळीने चुलखंडे घातलेली असत– एका झोपडीत अशी पाच चुलखंडे आहेत. परिघानजीक खळगे करून साठवणाची व्यवस्था होई. टिमोनोव्हका (सायबेरिया) येथे उत्तरपुराणाश्मयुगात प्रचारात असलेल्या दुसऱ्या एका प्रकारच्या घरांचे अवशेष मिळाले आहेत. ही घरे कडाक्याच्या थंडीपासून बचाव करण्यासाठीच तयार केलेली असावीत, यात शंका नाही. यांना कृत्रिम गुंफा म्हटले तरी चालेल. त्यांच्या रचनेसाठी जमिनीत तीन मी. किंवा अधिकही खोल असा गोल खड्डा करण्यात येई. याचा व्यासही तेवढाच आहे. आत जाण्यासाठी जिना असे. वरच्या बाजूने मोठाली लाकडी आडवाटे वा बांबू टाकून त्यावर गवत, पाला व चिखल थापून छप्पर तयार करीत. साधारणपणे जिन्यानजीक किंवा झोपडीच्या (खड्ड्याच्या) बाहेर उघड्यावर चुली पेटविण्यात येत. चीनमधील शान्सी प्रांतात तसेच भारतात काश्मीरमध्ये ⇨ बुर्झाहोम येथे अशा प्रकारची घरे सापडली आहेत. मात्र दोन्ही ठिकाणी ती नवाश्मयुगातीलच आहेत. परंपरेच्या सातत्याची कल्पना देण्यासाठी त्यांचा येथे उल्लेख केला आहे. आंतराश्मयुगीन निवासांची सर्व माहिती बव्हंशी यूरोपातूनच मिळालेली आहे. पुराणाश्म- युगाच्या मानाने हवामान बरेच उष्ण असल्याने गुहांतून वा प्रस्तरालयांतून राहण्याची किंवा खड्ड्यासारख्या घरांतून राहण्याची आता जरूर नव्हती. त्यामुळे वर्षभर उघड्या मैदानावर आता राहता येऊ लागले. स्वाभाविकच घर बांधण्याची विद्या आता प्रगत झाली. या प्रगतीला मुख्य हातभार कशाचा लागला असेल, तर तो माणसाच्या जीविताला लाभलेल्या स्थैर्याचा. विशेषतः नद्यांच्या वा तलावांच्या आसपास बारमास मासळी मिळू लागली. तेव्हा येथे राहणे आवश्यक झाले. या वेळेपर्यंत जंगलाची वाढही झालेली होती व लाकडाचा सफाईने उपयोग करता येऊ लागला. परिणामी जास्त टिकाऊ व प्रशस्त घरे या काळात रूढ झाली. घर बांधण्यासाठी वाळवंटी (कोरडी) किंवा थोड्या उंचवट्यावरची जमीन निवडण्यात येऊ लागली. कोरडी जमीन मिळाली नाही, तर तीवर फांद्या, पालापाचोळा, झाडाच्या साली अंथरीत (जर्मनी–लूबेक इंग्लंड–स्टारकार) व त्यावर माती पसरून कोरड्या जमिनी तयार करीत. घरे सामान्यतः गोल व लंबगोल आराखड्याची असत. लाकडी (फांद्यांच्या) भिंती व तशीच छपरे असत. क्वचित कातडी छप्परही असे. घर उभे करताना कोठे कोठे दगडांचा वापरही केला आहे. आतापर्यंतच्या काळात सहसा न आढळणारी एक गोष्ट आता दिसू लागते ती म्हणजे घरांचे समूह. इंग्लंडमध्ये सरे परगण्यात किंवा डेन्मार्क-हॉलंडमध्ये असे समूह अनेक ठिकाणी आढळतात. मात्र ही सगळी घरे एकाच वेळी वापरात होती का पुन्हापुन्हा नव्याने बांधीत याविषयी निश्चित माहिती नाही. कारण गृहसमूहांना आनुषंगिक अशा रस्ते किंवा सरंक्षणयोजना कोठेच दिसत नाहीत. त्या पुढे आल्या.

जीविताच्या इतर शाखांप्रमाणे याही क्षेत्रात नवाश्मयुगात क्रांतिकारक बदल झालेले दिसतात. नव्या जीवनपद्धतीत स्थिर वस्ती ही समाजाची गरज झाल्याने जास्त टिकाऊ निवासस्थाने आवश्यक झाली. स्वाभाविकच चिवट व बळकट सामान कौशल्याने वापरण्यात येऊ लागले. लव्हाळे, बांबू, कातडी यांच्या ऐवजी आता मोठाले लाकडी ओंडके, दगड, कच्च्या विटा यांचा उपयोग होऊ लागला. नवाश्मयुगीन निवासस्थानांत स्थलकालपरत्वे खूपच वैविध्य आढळते. घरांचा आराखडा आता गोल, चौरस वा आयत अशा आकारांचा झाला. मध्याश्मयुगातही भिंत हा घटक फारसा कोठे आढळत नाही. आता बांबूच्या-वेताच्या तट्ट्यापासून, दगड, कच्च्या विटा यांच्या बांधलेल्या अशा सगळ्या प्रकारच्या भिंती दिसून येतात. या भिंतींवर गिलावा करून त्यावर रंगकामही केलेले आढळते (जार्मो). भिंती भक्कम करण्यासाठी त्यांखाली दगडी जोती ठेवण्याच्या प्रथेचाही आरंभ झालेला दिसतो (जार्मो). भोवतालच्या जमिनीपेक्षा घराची जमीन थोडीशी खोलगट करण्याची प्रथा आताही बऱ्याच भागांत चालूच राहिली. छपराचे स्वरूप मुख्यत्वे बांधकामाची साहित्यपद्धती व पर्जन्यमान यांवरच अवलंबून राहिले. पावसाळी भागात लाकडी उतरती वा दगड-विटा यांची घुमटाकार व इतरत्र सपाट अशी छपरे इमारतींवर असत. ⇨जेरिको (पॅलेस्टाइन), खिरोकिटिया (सायप्रस), हसौना (उ. मेसोपोटेमिया) हे अवशेषांचे त्याबाबतचे नमुने होते. कालांतराने घरांमध्ये एकच दालन ठेवण्याऐवजी त्याच्या खोल्या पाडण्यात येऊ लागल्या. सायप्रसमधील खिरोकिटिया येथील वर्तुळाकार घरात पोटमाळा काढलेला होता. त्याला पक्क्या खांबांचा आधार होता, तरीही जिना मात्र पक्का नव्हता. तेथे साध्या शिडीचाच उपयोग केलेला असावा. उपलब्ध जागेच्या विभाजनाचा हा एक स्वतंत्र व फारसा रूढ न झालेला प्रकार. खोल्यांची कल्पना रुजल्यावर कित्येक ठिकाणी समोर ओवरी, त्यामागे एकापाठोपाठ एक अशा दोन खोल्या, अशीच मांडणी हलाफ (सिरिया) येथील अवशेषांवरून दिसते. यापुढे हसौना येथे एका उघड्या चौकाभोवती अनेक खोल्या मांडलेल्या दिसतात. सर्व खोल्यांना हवा व उजेड पोचण्यास ही योजना उपयुक्त होती, तसेच सगळ्यांभोवती एक मोठी भिंत असल्याने सगळे घर सुरक्षित राही. आर्पाकिया (उत्तर इराक) या ठिकाणी घरांची थोडी निराळी रचना सापडते. वर्तुळाकार रचनेचीच ही थोडी सुधारलेली आवृत्ती असावी. या घराचे दोन भाग दिसतात. एक वर्तुळाकार दालन व त्याच्या समोर आयता- कार दालन दिसते. या दालनाला प्रवेशद्वार असावयाचे. पण हा आराखडा अपवादात्मक होय. एरवी गृह-

रचनेच्या विद्येतील सर्व मूलभूत घटक–वास्तुसाहित्य, वास्तुरचना, तंत्र, वास्तुविधान व सुशोभन–नवाश्म- युगीनांनी आत्मसात केलेले दिसते. वास्तुविद्येची ही सर्व प्रगती मुख्यत्वे पॅलेस्टाइन, तुर्कस्तान, इराक या भागांत व भूमध्य समुद्रातील काही बेटांत झाली, हे ध्यानात घ्यावयास हवे. कारण साधारणत: याच भागात नवाश्मयुगीन संक्रमण सिद्धीस पोचले असावे, असे समजतात.

यूरोप, चीन, भारत व ईजिप्त या ठिकाणी नवाश्मयुगीनांनी बांधलेली घरे बरीचशी निराळी आहेत. यूरोप- मध्ये गृहरचनेस लाकडाचाच उपयोग होत गेला. आयताकार वा चौरस घरे भक्कम लाकडी किंवा बांबूच्या सांगाड्याभोवती बांधीत. भिंती आणि बहुधा छपरेही फळ्यांची केलेली असत. क्वचित त्यांवर गवत पसरीत (फेडर्झे, कोलोन-लिंडन्थॉल), ईजिप्तमध्ये ⇨ फायूम येथे बांबू व तट्ट्या यांच्या झोपड्या वापरीत असावेत असे दिसते. यानंतरच्या मेरिम्डीयन समाजाने अशा झोपड्यांची छपरे घुमटाकार बनवून त्यांवर चिखल थापण्यास आरंभ केला. चीन व भारत या दोन्ही ठिकाणी सामान्यपणे लाकूड व गवत यांच्या वर्तुळाकार वा चौकोनी झोपड्या वापरलेल्या दिसतात (टेक्कलकोटा). क्वचित प्रस्तरालयाचाही आश्रय केलेला होता. परंतु चीनच्या शान्सी व भारताच्या काश्मीर भागात खड्ड्यांत केलेली घरे या काळात वापरीत.

आंतराश्मयुगात काही ठिकाणी पाचसात घरांचे समूह दिसले, तरी त्या वेळी ग्राम या कल्पनेचा जन्म झाला नव्हता. नवाश्मयुगात बरीच माणसे कायमची एका ठिकाणी राहणार, म्हणजे बरीच घरे एकमेकांशेजारी बांधली जाणार, असे झाल्यावर या सहवासाचा अर्थ व त्यातील प्रश्न समजावयास लागले. या माणसांना ये-जा करण्यास मार्ग हवेत, म्हणजे रस्ते हवेत. नवाश्मयुगातील बर्‍याच मोठ्या कालखंडात रस्ता ही कल्पना ज्ञात नव्हती. दोन घरांच्या मध्ये उरणाऱ्या जागेतूनच दळणवळण चाले. हे सोयीचे करण्याचे प्रयत्न क्वचित काही ठिकाणी झालेले दिसतात. आर्पाकिया येथे अशा वाटांवर दगड अंथरले होते, तर खिरोकिटिया येथे मुख्य रस्त्यावर फरसबंदी केलेली होती. परंतु ही उदाहरणे अपवादात्मक होत. यूरोपातील काही वसाहतींत (फेडर्झे) घरे एका ओळीत बांधून मध्यभागी हेतुत: रस्ते ठेवलेले दिसतात. इतरत्र अशी योजनापूर्वक मांडणी सापडत नाही. वाहने नसल्याने खेड्यांना एकमेकांशी जोडणारे रस्ते निर्माण होण्याची शक्यताच नव्हती. खेड्यांच्या रक्षणासाठी काही बांधकाम करण्याची व्यवस्था नवाश्मयुगात प्रथम झाली. इ.स.पू. आठव्या सहस्रकात जेरिको येथे एक प्रचंड दगडी तटबंदी उभारण्यात आली होती. पण हेही एकुलते एकच उदाहरण आहे. नवाश्मयुगाच्या अगदी शेवटी शेवटी भूमध्य सागराभोवतालचा प्रदेश व पश्चिम आशिया या भागांतील काही ठिकाणी विटांच्या तटबंद्या बांधण्यात आल्या (मर्सीनू, हसितकार, ट्रॉय). उत्तर व मध्य यूरोपातील वसाहतींभोवती लाकडी तटबंद्या व खंदक आढळले आहेत (कोलोन-लिंडन्थॉल). फ्रान्समध्ये काही टेकड्यांच्या माथ्याभोवती असणाऱ्या दगडी भिंती याच काळातील समजतात. ही सर्व उदाहरणे फुटकळ आणि काळ व स्थळ या दोन्ही दृष्टींनी एकमेकांपासून दूरची आहेत. म्हणून ग्राम अस्तित्वात आले, तरी ग्राम-योजना व ग्राम-संरक्षण या कल्पनांचे आकलन झाले होते किंवा त्या रुजल्या होत्या, असे निश्चितपणे म्हणता येत नाही.

दळणवळणासाठी वाहने वापरली जात असल्याची शक्यता असली, तरी प्रत्यक्षात वाहने होती किंवा कसे आणि असल्यास त्यांचे स्वरूप काय असावे, हे सांगता येत नाही. प्राणी माणसाळविलेले असल्याने ओझे लादून नेण्यास वा बसून जाण्यास उपयोगी होत असावेत. उत्तरपुराणाश्मयुगात होड्या करता येऊ लागल्या होत्या. नदीत अगदी थोड्या अंतरावर जाऊन मच्छीमारीसाठी त्यांचा वापर होई. नवाश्मयुगात होड्या होत्याच. त्यांचा आकार थोडा वाढला होता. या काळाच्या शेवटी कदाचित शिडीही वापरण्याची विद्या मानवाला साध्य झाली असावी. मात्र ही प्रगती पूर्णपणे स्थानिक होती. ती नाईल नदीवरील प्रवासापुरतीच मर्यादित होती.

हत्यारे व आयुधे: आपल्या अंगातील नैसर्गिक शक्तीला भोवतालच्या पदार्थांची जोड देऊन स्वत:ला अधिक कार्यक्षम बनविणे हा कोणत्याही मानवी तंत्रज्ञानाचा प्राथमिक उद्देश असतो. अश्मयुगात मानवाने लाकडे, हाडे व मुख्यत: दगड यांचे साहाय्य घेतले. त्यापासून आपल्या उपयोगी पडतील अशी उपकरणे व आयुधे घडविण्यास त्याने आरंभ केला. किंबहुना उपकरणे व आयुधे वापरण्याची बुद्धी व ती तयार करण्याची शक्ती ही मानवाची व्यवच्छेदक लक्षणे समजावी लागतात. अश्मयुगातील तंत्रविषयक प्रगतीच्या दिशा पुढीलप्रमाणे होत : एखाद्या विशिष्ट कामाला विशिष्ट आकाराचीच उपलब्ध वस्तू (दगड) जास्त उपयोगी पडते ही जाणीव त्यास झाली. ही जाणीव एकाएकी प्राप्त न होता अनुभवातूनच उत्पन्न होते. त्यामुळे विशिष्ट आकाराच्याच दगडांची निवड करून, हव्या त्या आकारांचे दगड न मिळाल्यास, जे दगड हाताशी असतील त्यांना मनाजोगता आकार देण्यास त्याने सुरुवात केली.यासाठी दगडाचे टवके व तुकडे उडविणे व योग्य आकार देणे त्यास क्रमप्राप्तच होते. पूर्णपुराणाश्मयुगाच्या आरंभापासूनच येथपर्यंत त्याने मजल मारलेली दिसते.दगडाचा आकार जसा निवडता आला, तसाच त्याचा प्रकारही मानव निवडू लागला.ठिसूळ

दगडांचे आडवे कातळ निघू शकतात, हेही ज्ञान त्यास होऊ लागले. त्याचप्रमाणे तो उपकरण-प्रकाराला जास्त अनुकूल असा दगडाचा प्रकारच निवडू लागला. पुराणाश्मयुगाच्या मध्य व उत्तर खंडांत त्यास अशी पारख पूर्णत्वाने प्राप्त झालेली दिसेत. लहान आकाराचे छिलके व पाती यांसाठी चर्ट (Chert), ॲगेट (Agate) असे अत्यंत घट्ट व एकसंध पाषाणप्रकार त्याने निवडलेले दिसतात. निवडलेल्या पाषाणप्रकारांतून अपेक्षित आकार घडविण्याच्या पद्धतींत पुढे वैविध्य आले व प्रगती झाली. बदामी आकारचे व बहुविध उद्योगांचे ‘हातकुऱ्हाड’ नावाचे हत्यार तयार करण्याच्या दोन पद्धतींवरून हा मुद्दा जास्त स्पष्ट होईल. अबेव्हिलियन पद्धतीत दगडाचे मोठाले टवके उडवीत, त्यामुळे आयुध ओबडधोबडच राहत असे. अश्यूलियन पद्धतीत टवके उडवून हलकेहलके इष्ट आकार घडवीत. त्यामुळे सलग व धारदार अशी कड व अणकुचीदार टोक तयार होई. केवळ दगडाचे आयुध वापरण्याऐवजी त्याला लाकडी किंवा हाडाच्या दांड्याची जोड द्यावी, हे ज्ञान त्यास होऊ लागले. दगडी हत्यार काठीला वा हाडाला बांधून दांड्यात भोक पाडून त्यात दगड, किंवा दगडात भोक पाडून त्यात दांडा, तो अडकवू लागला. दांड्याला खाचा पाडून त्यात तो दगड बसवू लागला. त्यामुळे कुऱ्हाडी, विळे, बाण असे संयुक्त आयुध बनू लागले. उत्तरपुराणाश्मयुगापासून पुढे संयुक्त आयुधे विशेष प्रचलित झालेली दिसतात. यासाठी दगडाच्या लहान आकाराच्या छिलक्या व पाती तयार करण्यास या वेळेपासूनच प्रारंभ झाला होता. आंतर व नव या दोन अश्मयुगांत या छोट्या पात्यांचा उपयोग करून हरतऱ्हेची संयुक्त आयुधे बनविण्यात मानवास प्रावीण्य प्राप्त झाले. बाण, सुऱ्या, विळे, खुरपी अशी अनेकविध उपकरणे आता तयार झाली. लहानलहान भाग एकत्र आणून आयुध तयार करण्याची ही पद्धती पूर्वीच्यापेक्षा अधिक वेळ खाणारी व विशेष कौशल्याची होती. परंतु यामुळे उत्पन्न झालेली आयुधे विविध प्रकारची तर होतीच, पण कार्यक्षमही होती. उपकरणे वा आयुधे यांच्या निर्मितितंत्राची उत्क्रांती विचारपूर्वक किंवा पूर्व-

योजनेप्रमाणे झाली नाही. गरजा, उपलब्ध सामग्री आणि परंपरागत ज्ञान यांच्या समन्वयातून ती होत गेली. उदा., पुराणाश्मयुगात मुख्यत: घातक आयुधे तयार झाली, तर नवाश्मयुगात शेतकी व्यवसायाला उपयोगी अशी विळा, खणण्याची काठी ही अवजारे तयार होत होती. क्षेपणायुधांत भाला, भालाफेकीची काठी, बोला, धनुष्यबाण व गोफण ही सर्व प्राणघातक आयुधे होती. मुख्यत: शिकारीसाठी वापरण्यात येणारे आयुध म्हणजे भाला. टोकदार काठी हेच भाल्याचे पहिले रूप होय. टोक भाजून, टणक करून, टोकाला दगडी फाळ लावून ते केलेले असे. हे भाले जास्त दूरवर फेकता यावेत म्हणून त्यांच्या एका टोकाला उंचवटा असणारी काठी उत्तरपुराणाश्मयुगात काही ठिकाणी वापरात आली. तीनचार कातडी वाद्यांच्या टोकांना गोल गोटे बसवून त्यांची दुसरी टोके एकत्र बांधलेले आयुध म्हणजे ‘बोला’. आपल्या डोक्यावर ते गरगर फिरवून जोराने भिरकावून दिले, की चक्रासारख्या फिरणाऱ्या या गोट्यांच्या तडाख्यात एखादा मोठा पक्षी सापडे किंवा त्यात श्वापदाचे पाय गुंतून ते हाती लागे. धनुष्यबाणाच्या उपयोगास आंतराश्मयुगापासून आरंभ झाला असावा. धनुष्याला कातडी वादी लावीत. बाणाला दगडाची किंवा हाडांची टोके बसवीत. गोफण हे एक प्रभावी क्षेपणायुध नवाश्मयुगात गवसले. त्यास दगड नसले तर मातीचे भाजून पक्के केलेले गोळे वापरीत असत. लाकडे व हाडे यांचा स्वतंत्र उपकरणांच्या निर्मितीसाठीही उपयोग केलेला आढळतो. लाकडाची हत्यारे कालौघात बव्हंशी नष्ट झाली तरी भाला, भालाफेकीची काठी, धनुष्यबाण व खणण्याची काठी ही महत्त्वाची अश्मयुगीन अवजारे लाकडीच होती, हे निश्चित. हाडे व शिंगे यांजपासून बनविलेल्या अनेक वस्तू आजही टिकून राहिल्या आहेत. त्यांत प्रामुख्याने बाणांची टोके, मासेमारीसाठी छोटे काटेकारी बाण, गळ, सुया, दाभणे यांचा समावेश होतो. ह्यांपैकी काही वस्तूंची निर्मिती जरी उत्तरपुराणा-श्मयुगात होऊ लागली असली, तरी त्यांतील वैविध्य व कौशल्य आंतराश्मयुगातच पाहावयास मिळते. या काळातच हस्तिदंताच्याही वस्तू बनविण्यात येऊ लागल्या.

अग्नी : तांत्रिक विद्यांच्या बरोबरीने अग्नीचेही मानवाला मोठे साहाय्य झाले आहे. अश्मयुगातील सर्वांत प्राचीन असे मानवसंबद्ध अग्नीचे अवशेष चीनमधील जोकोत्येन येथील गुहांत मिळाले आहेत. यदृच्छया निर्माण झालेला अग्नी तसाच तेवत ठेवण्याची कला जोकोत्येनच्या रहिवाशांना माहीत असावी. पुढे अश्म- युगाच्या विविध खंडांत सर्वत्र मानवाने अग्नीचा सतत उपयोग केलेला दिसतो, मात्र तो अग्नी त्याने उत्पन्न केला, की वणव्यासारख्या आगीची धग टिकवून धरली, हे सांगता येत नाही. लाकडे, हाडे किंवा क्वचित कोळसा (पॅलेस्टाइन) या कामाला सर्पण म्हणून वापरलेला असे. अग्नी निर्माण करण्याची विद्या उत्तरपुराणा- श्मयुगात साध्य झाली असण्याची शक्यता आहे. आंतराश्मयुगात व नवाश्मयुगात ती नक्कीच हस्तगत झाली होती. गारगोटी व लोखंडाचा अंश असलेला दगड यांच्या घर्षणातून अग्नी उत्पन्न करीत. अग्नीचा उपयोग कृत्रिम रीत्या उष्णता व उजेड निर्माण करणे, कच्चे मांस भाजून खाणे, जनावरांची चरबी दगडी दिव्यात घालून वाती जाळणे, जनावरांना घाबरवून स्वत:चे रक्षण करणे, काठ्यांची व हाडांची टोके भाजून ती टणक करणे इत्यादींसाठी होत असे. आंतराश्मयुग व नवाश्मयुग यांत अग्नीचा सुटसुटीतपणे वापर करता यावा म्हणून शेगड्या, चुली, भट्ट्या तयार करण्यात आल्या होत्या. स्वयंपाकाबरोबरच, मातीच्या मूर्ती अथवा भांडी भाजणे यांसाठीही नवाश्मयुगात अग्नीचा वापर झाला. अशा भट्ट्या काही नवाश्मयुगीन वसाहतींच्या अवशेषांत मिळाल्या आहेत.

उपकरणे, भांडे इ. : पुराणाश्मयुगातील व आंतराश्मयुगातील अत्यंत अस्थिर आणि भटके जीवन लक्षात घेता, मानवाला काही साठवणाची गरज भासली असेल, असे वाटत नाही. साठवून ठेवण्यासाठी वेळ अथवा निकड त्याला भासावी असे पदार्थही त्या वेळी त्याच्याजवळ नव्हते. उत्तरपुराणाश्मकालीन गुंफांतील चित्रकारांनी वापरलेले दगडी दिवे सोडले, तर अन्य कसलेही भांडे ज्ञात नाही. पुढे नवाश्मयुगाच्या पूर्वार्धात जेरिको, जार्मो येथील माणूसही फक्त दगडीच भांडी वापरीत होता. यांत कटोरे, पेले असे काही प्रकार आढळतात. दगडी भांड्यांच्या घडणीत व सजावटीत थोडा फरक स्थलकालपरत्वे आढळतो. उदा., सायप्रसमधील खिरोकिटिया येथील भांडी घासून घासून झिलईदार करण्यात येत. परंतु त्यांच्या आकारात फारसे वैविध्य नाही. दगडाप्रमाणेच लाकडी ठोकळे कोरून त्यापासून भांडी तयार करण्यात येत असतीलही, परंतु त्यांचे आज अवशेष नाहीत.

नवाश्युगाच्या पूर्वार्धापर्यंत मृत्पात्रे करण्याची विद्या मानवाला हस्तगत झालेली नव्हती. नवाश्मयुगाच्या मध्यापासून अशी भांडी बनविण्याला आरंभ झाला. निदान पश्चिम आशिया व भूमध्य समुद्राभोवतालचा प्रदेश यांपुरते तरी हे विधान निश्चित पुराव्यांवर आधारलेले आहे. मृत्पात्रे तयार करण्याची विद्या केवळ याच लोकांना साध्य झाली, असे समजण्याचे कारण नाही. तिचा उगम निरनिराळ्या ठिकाणी स्वतंत्रपणेही झाला असेल. तद्वतच ती याआधीही कोणा समाजाला साध्य झाली असेल. पण प्रत्यक्ष आधाराने सांगता येते, ते फक्त पश्चिम आशियाविषयी. या कलेचा उगम कसा झाला याविषयी जी अनेक मते प्रचलित आहेत, त्यांत जास्त ग्राह्य अनुमान असे, की आधीपासून वापरात असणाऱ्या बांबूच्या टोपल्यांना माती लिंपण्यास आरंभ झाला. एखादी अशी टोपली केवळ योगायोगाने जळाली असावी व लिंपलेल्या मातीचे झालेले तुकडे हाती लागले. अशा अपघातातून मातीच्या दोन गुणांचा शोध लागला. ते म्हणजे–मनाजोगता आकार देता येणे व

भाजूण काढले तर तो आकार पक्का होणे. याच माहितीचा उपयोग करून मृत्पात्रे करण्यास आरंभ झाला. भांडी करताना, त्यांना आधीपासून दगडी-लाकडी भांड्यांना देण्यात येणारे वाडगे, कुंडे यांसारखे आकार तर दिलेच पण ठेवरेवीला, विशेषत: पाणी व तत्सम द्रवपदार्थ यांच्या ने-आणीला, जास्त उपयुक्त अशी लहान तोंडाची भांडीही तयार करण्यात येऊ लागली. भोपळा, नारळ अशांसारख्या फळांवरून हे आकार सुचले असावेत. कदाचित या फळांच्या कवचांचा असा उपयोग यापूर्वीही केला जात असावा. लवकरच या भांड्यांना रंग लावून व त्यांवर नक्षी उमटवून ती सुशोभित करण्यासही सुरुवात झाली असावी. यापुढे निरनिराळे आकार, भांडी घडविण्याच्या पद्धती यांचे शोध लागत गेले. चाकाचा शोध लागला अधिक प्रमाणबद्ध व डौलदार भांडी तयार होऊ लागली. भांडी भाजण्यासाठी निरनिराळ्या प्रकारच्या भट्ट्याही वापरात आल्या. परंतु हा सर्व पसारा नवाश्मयुग व ⇨ताम्रपाषाणयुग यांच्या संधिकालातीलच आहे.

बांबू, लव्हाळे व वेत एकत्र गुंफून, मासे पकडण्यासाठी खूप मोठाल्या टोपल्या आंतराश्मयुगीन यूरोपात (डेन्मार्क – एर्टेबोल संस्कृती) वापरीत. याच्या पुढची पायरी म्हणजे चटया विणणे आणि शेवटी घरगुती उपयोगाच्या लहानमोठ्या टोपल्या, दुरड्या विणणे ही होय. पॅलेस्टाइनमधील जेरिको व जार्मो आणि ईजिप्तमधील फायूम यांसारख्या ठिकाणच्या नवाश्मयुगीन थरांत मातीवर उमटलेल्या ठशांच्या स्वरूपात टोपल्या व दुरड्या यांचे अवशेष पाहावयास सापडतात. यांग-शो या चिनी नवाश्मयुगीन समाजास बुरूडकाम अवगत होते. अमेरिकेतील बुरूडकामाचा पुरावा साधारण पॅलेस्टाइनइतकाच इ.स.पू. सातव्या सहस्रकातील असून दक्षिण अमेरिकेतील बुरूडकाम अत्युकृष्ट दर्जाचे समजले जाते.

धर्म : पुराणाश्मयुगातील व आंतराश्मयुगातील धार्मिक जीवनात मुख्य साधन म्हणजे गुहांतील चित्रे होत. ह्या गुहा मंदिरे वा प्रार्थनास्थळे म्हणून वापरण्यात येत असत. नवाश्मयुगात प्रथमच मंदिर किंवा प्रार्थनास्थान उभारलेले दिसते. मध्याश्मयुगातील व्हिस्टोनीसचे पुरोहिताचे घर सोडले, तर यापूर्वीच्या काळातील धार्मिक स्वरूपाची कोणतीच वास्तू मिळालेली नाही. जेरिका येथील मंदिरे आयताकार होती. क्वचित त्यांच्या समोर एक ओवरी आणि एक छोटासा मंडपही दिसतो. दारासमोरच्या भिंतीत कोनाडा करून त्यात दगडी खांब वा मूर्ती ठेवती. आर्पाकिया येथे एक प्रशस्त घुमटाकार मंदिर आहे. गाभारा गोल (व्यास ९ मी.) व त्यासमोर आयताकार मंडप (लांबी १८ मी.) आहे. दोन्ही ठिकाणी घराचीच रचना थोड्याफार फरकाने मंदिरासाठी वापरलेली आहे, हे स्पष्ट दिसते. तुर्कस्तानातील नवाश्मयुगीन अवशेषांत (कटाल हयुक) हीच गोष्ट अधिक स्पष्ट दिसते. तेथील मूर्तिकाम, भिंतीवरील चित्रे व शिल्पे यांमुळे या वास्तू धार्मिक उपयोगाच्या असाव्यात हे कळते. त्या वेळी धार्मिक वास्तूंना काहीं ठळक वैशिष्ट्ये प्राप्त झाली असावी, हे उब्राइड संस्कृतीच्या अवशेषांवरून स्पष्ट होते (एरिडू व टेपे गौरा). आयताकार दालनाच्या एका टोकाला मूर्तीचे पीठ अथवा स्थंडिल आहे. बाहेरून जोते बरेच उंच ठेवीत. अनेक भित्तिस्तंभ किंवा क्षेपप्रतिक्षेप आहेत. सुमेरियन काळातील ⇨झिगुरातसारख्या मंदिराच्या वास्तूंच्या रचनावैशिष्ट्यांचा उगम येथे पाहावयास सापडतो. ह्याशिवाय दगडी, मातीच्या वा हाडाच्या मूर्ती आणि थडगी यांवरूनही धार्मिक जीवनासंबंधी बरीच माहिती मिळते. त्याच्या धार्मिक कल्पना निश्चितपणे काय होत्या, ह्याविषयीचा कसलाच स्पष्ट पुरावा आज मिळत नाही. तसेच वैयक्तिक व सामाजिक स्मृतींतून निर्माण होणाऱ्या दंतकथा व परंपरा यांचीही माहिती आपल्याला नाही. मात्र पुरोहिताचे स्थान काय व तो काय कामे करीत असावा, याची थोडीफार कल्पना येते पण त्याच्या शक्तीचे गूढ समजत नाही.

जारणमारण यांसारख्या तंत्रांवर लोकांचा त्या वेळी विश्वास होता. एखाद्या जनावराच्या छोट्या प्रतिकृतीवर बाण लागल्याचे चित्र काढले, की तो प्राणी शिकारीत सहज हाती लागेल अशी कल्पना होती. फ्रान्स व स्पेन येथील अनेक गुहांत अशी कितीतरी चित्रे सापडतात. भालाफेकीच्या काठीवरील कोरीव चित्रेही याच उद्देशाने काढलेली असावीत. केवळ शिकारीवरच अवलंबून असणाऱ्या माणासाने आपल्या व्यवसायात अतिमानुषी शक्तींचे अशा तऱ्हेने साहाय्य मिळविण्याचा यत्न करावा हे स्वाभाविक वाटते. दुसरे तत्त्व म्हणजे जननतत्त्व होय. या तत्त्वाची आराधना करण्यात येत असल्याचा पुरावा अनेकविध स्वरूपांत सापडतो. वर उल्लेखिलेल्या मातृका-मूर्ती या त्यांतील प्रधान अवशेष होत. समागम करणाऱ्या पशूंच्या मूर्तीत हाच आशय आहे. एतद्विषयी काही क्रियाकर्मे (विधी) होत असावीत, असे फ्रान्समधील गुहेत असणाऱ्या पूर्णाकार नग्न स्त्रीमूर्तीवरून वाटते. तिसरी महत्त्वाची गोष्ट मरणोत्तर जीवनाविषयीची असून त्यात ‘आत्मा अमर आहे’ ही कल्पना पूर्वी पूर्वपुराणाश्मयुगातही मूळ धरून असावी. या कल्पनेच्या दोन पायऱ्या दिसतात. एक मृतात्म्याचा प्रवास व दुसरी पुनर्जन्म आणि तोही शक्यतो मानवी स्वरूपात दर्शविला आहे. यूरोपात सापडलेल्या निअँडरथल मानवाच्या थडग्यांतून अन्न, हत्यारे व क्वचित दागिनेही त्याच्या भोवती पुरलेले दिसतात. अन्न व हत्यारे ही त्याच्या मरणोत्तर जीविताची शिदोरीच होय. थोड्या नंतरच्या काळात पुरलेल्या प्रेतांचे पाय पोटाशी दुमडून घेतलेले आहेत. यांत आईच्या पोटात मूल याच अवस्थेत असते, हे प्रामुख्याने दाखवावयाचे असून पुनर्जन्माची प्रतीक्षा करणारा हा जीव भूमातेच्या पोटात त्याच अवस्थेत पुरण्यात येत असे. गुहेच्या जमिनीत किंवा क्वचित झोपड्यांच्या जमिनीखाली मृताला पुरण्यात येत असे. यावरून हा मृतात्मा घरादारांचे रक्षण करण्यासाठी तेथे ठेवीत, असा निष्कर्ष काही तज्ञ काढतात. गणचिन्हासंबंधीही अश्मयुगीन मानवाच्या काही विशिष्ट कल्पना होत्या. एखाद्या प्राण्याच्या अगंच्या काही विशेष शक्तींमुळे वा गुणांमुळे त्याला महत्त्व प्राप्त होऊन तो एकेका गटाचा वा कुलाचा पालक बनत असे आणि त्याची प्रतिकृती ही त्या गटाचा ध्वज किंवा निशाणी समजली जाई. ही निशाणी पतकरताना, त्या प्राण्याचे अतिमानुषी बल आपल्या पाठीशी सतत अभे राहावे, ही कल्पना त्यामागे असावी.

नवाश्मयुगात शिकारीचे महत्त्व ओसरले. साहजिकच त्यात यश मिळविण्यासाठी जादूटोण्याची गरजही आता सरली. तथापि पूर्वीच्या काही समजुती थोड्याफार फरकानिशी पुढे चालूच राहिल्या. त्यांपैकी मातृकामूर्ती नवाश्मयुगीन अवशेषांत फार मोठ्या प्रमाणावर सापडतात. जननक्रियेतील स्त्रीतत्त्वाचे पूजन या स्वरूपात होत राहिले, तसेच आता पुरुष तत्त्वाचेही पूजन सुरू झाले असावे. भूमध्य सागराभोवतीच्या प्रदेशातील कुऱ्हाडपूजा ही लिंगपूजेशी निकट समजली जाते. शिवाय पुरुषतत्त्वाची आराधना कबुतर व वृषभ या रूपांत करण्यात येई. मृतात्म्याची व्यवस्था अधिक बारकाईने करण्यात येऊ लागली. केवळ खड्डा करून त्यात प्रेत गाडण्याऐवजी आता रचनापूर्वक बांधलेली थडगी दिसू लागली. काही भागांत मोठी दगडी थडगी वा शवपेटिका वापरण्यात येऊ लागल्या होत्या. कदाचित डामडौलाचा व वैभवाचा निदर्शक असा हा भाग समजता येईल. बहुतेक थडग्यांतून मातृकामूर्ती ठेवण्यात आलेल्या आहेत. या मूर्ती म्हणजे पूर्वी अभिप्रेत असणाऱ्या पृथ्वीमातेची मूर्त रूपे होत. खास नवाश्मयुगात उत्पन्न झालेला धार्मिक घटक म्हणजे नैसर्गिक शक्तीची (पंचमहाभूतांची) उपासना करणारा घटक होय. यापुढे शेती करू लागणाऱ्या समाजांना वार्षिक ऋतुचक्राची कल्पना यावयास लागलेली दिसते. त्यातूनच शेतीस उपयोगी पडणाऱ्या सूर्य व पाऊस या दोन देवतांची उपासना मूळ धरू लागली असावी. यांची मूर्त स्वरूपात पूजा होण्याऐवजी त्यांच्या स्थित्यंतराचे व गमनागमनाचे प्रसंग सामुदायिक उत्सवरूपाने साजरे होऊ लागले. दुसरीकडे जननतत्त्वाचा आवाका वाढून पूर्वीप्रमाणे माणसे व पशू यांच्या प्रजोत्पादनाबरोबर किंवा त्याहीपेक्षा जास्त महत्त्वाची म्हणून जमिनीची सुपीकता त्यात समाविष्ट झाली. या समजुतींतून निर्माण झालेल्या वेगवेगळ्या देवदेवतांची पूजा-अर्चा व प्रार्थना यांसाठी वर सांगितलेली मंदिरे उभारण्यात आली असावीत.

या सर्व समजुती, उत्सव, कल्पना ह्यांतून उत्तरनवाश्मयुगीनांना त्यांच्या पुराणकथा, दंतकथा-धर्म मिळाला असावा.

अलंकरण, कला इ. : उपजीविका कष्टसाध्य आणि एकूण जीवन अस्थिर असले, तरी मानवाची उपजत सौंदर्यदृष्टी व अभिरुची निरनिराळ्या प्रकाराने व्यक्त झालेली दिसते. त्यांतला सगळ्यांत महत्त्वाचा प्रकार म्हणजे अलंकरण. आपले शरीर सुशोभित करण्याची तीव्र इच्छा मानवाला सतत आहे. यासाठी चित्रविचित्र रंगांचे विलेपन ही सगळ्यात आरंभीची पायरी होय. अश्मयुगातील काही सांगाडेही गेरूने रंगविलेले आहेत. त्यांवरून अश्मयुगीन माणूस अंगाला रंग लावीत असावा, असा कयास करता येतो. दुसरा प्रकार म्हणजे, प्राण्यांची हाडे, दात, नखे किंवा वाळक्या बिया यांना भोके पाडून त्यांच्या माळा करून गळ्यात घालणे हा होता. आंतराश्मयुगीन अवशेषांत असे ताइतासारखे वापरलेले दात व हाडे खूप सापडतात. तिसरा प्रकार म्हणजे रंगीत वा चमकदार दगड घेऊन त्यांचे मणी, लोलक आणि ताईत तयार करणे व त्यांच्या माळा अंगाभोवती गुंडाळणे हा होता. चंद्रकोरीच्या, कुऱ्हाडीच्या किंवा पक्ष्याच्या आकाराचे ताईत सापडतात. पण बहुतेक ताईत हे तोड्याच्याच स्वरूपाचे समजावयास हवेत. नवाश्मयुगात दगडी मणी आणि ताईत यांचे विविध प्रकार पाहावयास मिळतात. अलंकारांकडे इतके लक्ष होते, की वस्त्रप्रावरणाकडे विशेष लक्ष देण्याची अश्मयुगीन माणसाला जरूरच भासली नसावी, इतका पुरावा मिळतो. अश्मयुगातील वस्त्रांचे प्रत्येक्ष अवशेष उपलब्ध नाहीत. माणसाचे पहिले चित्र उत्तरपुराणाश्मयुगातीलच पाहावयास मिळते. या चित्रणातून तो सहसा वस्रहीनच दिसतो. क्वचित काही मूर्तींवर (पूर्व यूरोप) केसाळ असे कपडे दाखविले आहेत. त्यावरून अतिशीत प्रदेशात जनावरांची कातडी लपेटून घेण्यात येत, पण इतरत्र वस्त्रांची जरूर भासत नव्हती. ही वस्त्रे शिवण्यासाठी वा ती बांधून घेण्यासाठी उपयोगी असे भोके पाडण्याचे दगडी टोचे व हाडांची दाभणे अवशेषांत मिळतात. जनावरांच्या केसांचा (लोकरीचा) कपड्यासाठी विणून उपयोग करीत किंवा काय, ते सांगता येत नाही.

गवताचे व अंबाडीसारख्या वनस्पतीचे धागे एकत्र विणून दोर तयार करीत. या दोरांचा उपयोग धन्युष्यांसाठी किंवा मासेमारीची जाळी विवण्यासाठी होत असे. सूत कातण्यास आरंभ नवाश्मयुगातच झाला. अवशेषांत चातीची, मातीची वा दगडी चाके मिळाली आहेत. तसेच मातीवर उमटलेले कापडाचे ठसे पॅलेस्टाइन व ईजिप्त येथील काही अवशेषांत मिळाले आहेत. इतरत्र अद्यापही चामड्याचेच कपडे वापरात असावेत. या अवशेषांतील मृत्पात्रांवर घागरा व जाकीट किंवा उपवस्त्र अशी दोन वस्त्रे काढलेली आढळतात. त्यांना गुंड्याही लावल्या आहेत. विणकाम व शिवण यांविषयीची अधिक माहिती नाही.

या प्रदीर्घ काळातील चित्रकला व मूर्तिकला यांचे अनेक नमुने आज उपलब्ध आहेत. यूरोप, आफ्रिका व आशिया हा तिन्ही खंडांत ते सापडतात. यांपैकी यूरोपात व आफ्रिकेत पूर्वपुराणाश्मयुगापासून थेट नवाश्मयुगापर्यंतच्या कलाकृती आहेत, तर आशियात सामान्यपणे आंतराश्मयुगीन कलाच दिसते. खुद्द नवाश्मयुगातील कलाकृतींचे प्रकार व त्यांची परंपरा पूर्णत्वे भिन्न आहे. पूर्वपुराणाश्मयुगातील चित्रकलेचे सर्वोत्तम नमुने फ्रान्स व स्पेन देशांतील गुहांतून सापडले आहेत. ही चित्रे गुहांत खूपच खोलवर, अगदी आतल्या भागांत काढलेली आहेत. उत्तरपुराणाश्मयुग व आंतराश्मयुग यांतील चित्रे जवळपास उघड्यावर असणाऱ्या दरडी व प्रस्तर यांवरच काढली आहेत. चित्रांच्या बाह्याकृती टोकदार दगडाने कोरून, पृष्ठभागावर उमटविलेल्या आहेत. यानंतर या आकृतींवर कुंचले किंवा फवारे यांनी रंग भरलेले आहेत. कुंचले बांबूच्या पट्ट्या किंवा काठ्यांची टोके ठेचून तयार कलेले असावेत. बहुतेक रंग नैसर्गिक रीत्या मिळतात तसेच वापरलेले आहेत. त्यांत मिश्रणाने बदल करण्याचा यत्न केलेला दिसत नाही. रंग देताना वर्ण्यविषयांनी अनुरूप असे स्वाभाविक रंग दिलेले आहेत. कित्येक वेळा रंग देण्याआधी खोदकाम करून आकृतीला उठाव देण्याचा प्रयत्न केलेला आहे. क्वचित माती थापून त्यातून उठावाची चित्रे केली आहेत. भोवताली वावरणारे गवे, रानरेडे, हरिणे, घोडे अशांसारखे प्राणी, प्राण्यांच्या शिकारींचे प्रसंग, नाच करणारे स्त्रीपुरुष, धार्मिक विधी करणारा पुरोहित हे प्रमुख चित्रविषय होत. स्पेनमधील काही गुहांतून वर्तुळे, चौकटी व तजन्य भौमितिक आकृत्या रेखाटल्या आहेत. उत्तरपुराणाश्मयुग आणि आंतराश्मयुग यांमध्ये रंगीत चित्रांऐवजी दगडाचा पृष्ठभाग खरवडून किंवा टाकी लावण्यासारखा ठोकून बाह्यकृती उमटविण्यात येत असे. अशा चित्रांना बहुधा रंग दिलेला नाही. मूर्तिकलेचे नमुने उत्तरपुराणाश्मयुगीनच आहेत. त्यांत हाडे, शिंगे व दगड यांवरील कोरीव कामाचा समावेश करता येतो. भालाफेकी काठ्या, पुरोहिताच्या हातातील दंड, यांवर अत्यंत वास्तवपूर्ण उत्थित शिल्पे खोदली आहेत. जनावरांच्या डोक्याच्या आकाराचे हाडांचे काही ताईतही मिळाले आहेत. दगडी कामांत स्त्रीमूर्ती मुख्य असून त्या अर्धाकृतीच्या व पूर्णाकृतीच्या स्वरूपांत आहेत. स्थूल शरीराच्या या मूर्तीचे नितंब, स्तन व जघनप्रदेश विस्तृत दाखविले आहेत. स्त्रीच्या जननकार्याकडे लक्ष वेधविण्याचा कलाकाराचा प्रमुख हेतू असावा. म्हणून यांना सामान्यपणे ‘स्त्रीमूर्ती’ म्हणत असले, तरी ‘मातृकामूर्ती’ म्हणणे जास्त सयुक्तिक ठरेल. नवाश्मयुगातील अवशेषांत चित्रकलेचे नमुने नाहीत. या कालखंडाच्या उत्तरार्धात मृत्पात्रांवर काढण्यात आलेल्या नक्षीत वेलपत्त्या, पशुपक्षी, भौमितिक आकृत्या अशा विविध आकृत्या असल्या, तरी या कामाचा चित्रकलेत समावेश करणे योग्य ठरणार नाही. मातीच्या भाजून केलेल्या आणि हाडाच्या मूर्ती, यांतील प्राणिमूर्ती व स्त्रीमूर्ती विशेष चांगल्या प्रकारे केलेल्या आहेत. यांतील स्त्रीमूर्ती मातृका-परंपरेतीलच आहेत. पूर्वीप्रमाणे या मूर्तीचे डोकेही केवळ एका गोळ्याने दाखवितात आणि नाकडोळेही कोरलेले नसतात.

पूर्वपुराणाश्मयुगातील कलाकृती म्हणजे आपल्या भोवताली दिसणार्‍या वस्तूंची केवळ नक्कल व प्रतिकृती नव्हे त्यांत निरनिराळे प्रसंग व परिस्थिती कल्पिली आहे. माणसाच्या प्रतिभाविलासाचा हा सर्वप्राचीन आविष्कार होय. विशेषत: गुहेतील चित्रकाम या दृष्टीने अत्यंत लक्षणीय समजावे लागते. मानवी बुद्धी व मन यांची एक वेगळीच झेप त्यांतून प्रतीत होते. परंतु या सगळ्या कलाकृती सौंदर्यनिर्मितीच्या उद्देशाने तयार करण्यात आल्या नाहीत हे निश्चित. त्यांत काही धार्मिक समजुती व कल्पना अंतर्भूत असाव्यात. किंबहुना पुराणाश्मयुगकालीन धार्मिक कल्पना आणि समजुती यांच्या माहितीचे मुख्य साधन म्हणजेच तत्कालीन चित्रकला होय [→प्रागैतिहासिक कला].

अश्मयुग, भारतातील: भारतात आजतागायत झालेले उत्खनन व संशोधन अश्मयुगातील कोणत्याच अवस्थेतील मानवाच्या जीविताचे स्पष्ट चित्र डोळ्यासमोर उभे करू शकत नाही. त्यातल्या त्यात नवाश्मयुगीन जीवनाविषयी थोडीशी तरी माहिती हाती येते पण इतर युगांतील मानव, त्याची वस्ती, त्याच्या भोवतालची सृष्टी, यांच्याविषयी जी कल्पना येते, ती फारच अंधुक व अस्पष्ट आहे. याचे साधे कारण असे, की अश्मयुगीन मानवाच्या जीवनावर प्रकाश पाडणारे जे अवशेष मिळाले आहेत, ते तुरळक व फुटकळ स्वरूपाचे आहेत. त्यांवरून त्याची जीवनपद्धती लक्षात येऊ शकत नाही व एकूण जागतिक अश्मयुगीन मानवी संस्कृतीशी असणारे त्याचे नातेही उलगडू शकत नाही. जे काही निष्कर्ष काढण्यात आलेले आहेत, ते फक्त दगडी आयुधे व उपकरणे यांच्या वर्गीकरणांतूनच. निरनिराळ्या वर्गांची यूरोपीय व आफ्रिकी वर्गांशी तुलना करून सांस्कृतिक टप्पे व कालक्रम यांविषयी विवेचन करण्यात आलेले आहे. या अवस्थांचा भूस्तरीय घडामोडींशीही कसा संबंध लावता येईल, या प्रश्नाचाही नीट निर्णय लागलेला नाही. या मर्यादा ध्यानात ठेवूनच भारतातील अश्मयुगासंबंधीच्या माहितीची नोंद घेतली जावी.

भारतीय अश्मयुगाचे चार खंड पाडण्यात येतात–पूर्वाश्मयुग, मध्याश्मयुग (कार्बन कालनिर्णयानुसार हा काळ ४०,००० वर्षांपूर्वीचा आहे, हे आता सिद्ध झाले आहे), उत्तराश्मयुग, आणि नवाश्मयुग यांतील नवाश्मयुगीन जीवनाचे स्वरूप जगाच्या इतर भागातील नवाश्मयुगातल्यासारखेच आहे. त्यापूर्वीच्या तीन कालखंडांतील सांस्कृतिक स्थिती, तदर्थक यूरोपीय संज्ञांत जे अभिप्रेत आहे तशी दिसत नाही. त्या अर्थाने उत्तरपुराणाश्मयुगाचा तर भारतात आढळही होत नाही. परंतु सांस्कृतिक अवस्था स्पष्ट करण्याच्या दृष्टीने सामान्यपणे भारतातील पूर्वाश्मयुग = यूरोपातील पूर्वपुराणाश्मयुग भारतातील मध्याश्मयुग = यूरोपातील मध्यपुराणाश्मयुग आणि भारतातील उत्तराश्मयुग = यूरोपातील उत्तरपुराणाश्मयुग अशी समीकरणे मांडता येतील.

पूर्वाश्मयुगातील आयुधांचे दोन स्पष्ट गट पडतात. एक गट वायव्य भारत व काश्मीर या भागापुरता असून, दुसरा भारताचा इतर प्रदेश, मुख्यत: आंध्र-तमिळनाडू इ. भागांत पसरला आहे. पहिल्या गटातील हत्यारे गोटे व मोठाली छिलके यांची बनविलेली आहेत. गोलसर बाजू पंजात पकडून खालच्या, सरळ धारेच्या बाजूने वस्तूंचे तुकडे पाडणे, हे या हत्यारांचे मुख्य काम होते. त्यांना चॉपर म्हणतात. पहिल्या गटात असे चॉपर व तत्सम प्रकार आढळतात. दुसऱ्या गटात, मुख्यत्वे छिलके व कपच्या दोन्ही बाजूंनी घडवून तयार केलेली बदामी आकाराची हातकुऱ्हाड हे मुख्य आयुध आहे. हे दोन्ही गट भौगोलिक दृष्ट्या अलग असले, तरी कालदृष्ट्या निकट आहेत–प्राय: समकालीनच असावेत. द्वितीय हिमयुगाच्या शेवटापासून येथे दोन्ही प्रकारची हत्यारे घडविण्यात आली. तृतीय हिमयुगात या संस्कृतीचा विस्तार व तंत्रज्ञान यांचा परमोत्कर्ष झाला पण या युगातील मानवाच्या शरीराचे कोणतेही अवशेष मिळालेले नाहीत.

कोकणपट्टीसारखे एका बाजूचे प्रदेश सोडले, तर भारताच्या बहुतेक सर्व भागांत मध्याश्मयुगीन आयुधे मिळाली आहेत. ही आयुधे चर्ट, जास्पर अशांसारख्या टणक व एकसंध दगडांपासून बनविलेली असून पूर्वाश्मयुगीन आयुधांपेक्षा खूपच लहान आहेत. यांत हरतऱ्हेच्या तासण्या, भोके पाडण्यास उपयुक्त अशी चोच असणारी हत्यारे बऱ्याच संख्येने सापडतात. कातडी कापण्यास व शिवण्यास त्यांचा उपयोग होत असावा. त्यांबरोबर छोट्या हातकुऱ्हाडीही आढळतात. वरील दगडांची छिलके व क्वचित पातीही दिसतात. मध्य-अभिनूतन काळाच्या शेवटच्या सहस्त्रकांपासून तो नूतनतम काळाच्या आरंभापर्यंत या युगाचे अस्तित्व होते. या काळी हवामान फारसे आर्द्र नसून घनदाट अशी जंगलेही फारशी पसरली नव्हती. या वेळच्या मानवाच्या शरीराचे अवशेष उपलब्ध नाहीत. आतापर्यंत रानटी बैल व भीमगज यांची हाडे सापडली आहेत.

मध्याश्मयुगाचा काळ ४०,००० वर्षांपूर्वीचा आहे, हे आता कार्बन कालनिर्णयानुसार सिद्ध झाले आहे. उत्तराश्मयुगाचा आरंभ नूतनतम काळाच्या आरंभी (इ.स.पू. १०,०००) झाला. काही भागांत तो इ.स.पू. ७,००० इतका नजीकचाही असू शकेल. मध्य व उत्तर भारताच्या काही भागांत असणारे घनदाट जंगलांचे प्रदेश सोडल्यास, इतरत्र मानवाची वस्ती उघड्यावर नदीकाठाने होती. पण या दोन जंगलांच्या प्रदेशांत मात्र मानवी वस्ती प्रस्तरालये व गुहा यांतच होती. या प्रस्तरालयांतील चित्रकामही उत्तराश्मयुगीनच असण्याचा संभव आहे. या युगातील आयुधे, लघुअश्मास्त्रे याच सदरात जमा होतात व यांत मुख्यत्वे गारेच्या दगडाची किंचित लांबटशी पाती आहेत. त्यांपासून चाकूची पाती, चंद्रकोरी, टोचे ही आयुधे तयार करण्यात येत. ती आयुधे हाडे व काठ्या यांजबरोबर वापरण्यात येणारी, म्हणजे संयुक्त आयुधे होत. ⇨ लांघणज या गुजरातमधील ठिकाणाखेरीज अन्यत्र उत्तराश्मयुगीन स्थायिक वसाहतींचे अवशेष उपलब्ध नाहीत. शिकार, मच्छीमारी व प्राथमिक स्वरूपाची शेती हीच या काळातील उपजीविकेची मुख्य साधने होत. मृत्पात्रांचा वापरही सुरू झाला असावा. लांघणज याच ठिकाणी काही मानवी सांगाडे सापडले असून ते मिश्र वंशाचे आहेत. हातपाय पोटाशी ठेवून हे सांगाडे थडग्यांत पुरण्यात आले होते. या भागात पाणघोडे, अस्वले, हरणे, सांबरे, रानगाई असे प्राणी वावरत असत.

भारतातील नवाश्मयुग आणि ताम्रपाषाणयुग ही दोन्ही साधारण समकालीनच आहेत. नवाश्मयुगीन म्हणून ओळखल्या जाणाऱ्या अवशेषांतही तांब्याच्या वस्तू सापडतात. ताम्रपाषाणयुगीन समाजही नवाश्मयुगीनांप्रमाणेच शेतकी, पशुपालन यांवरच जगत असे. म्हणून या दोन स्वतंत्र अवस्था समजाव्यात किंवा कसे, यावर तज्ञांत एकमत नाही. तथापि घासून गुळगुळीत केलेल्या दगडी कुऱ्हाडी वा छिन्न्या यांसारखे आयुधप्रकार आणि इतर ठिकाणच्या नवाश्मयुगीनांशी असणारी साम्ये ध्यानात घेऊनच काही समाजांना नवाश्मयुगीन तर काहींना ताम्रपाषाणयुगीन संबोधण्यात येते. भारतातील ताम्रपाषाणयुगाचे तीन पृथक भाग पडतात. एक उत्तर व वायव्य भारतातील, दुसरा पूर्व भारतातील व तिसरा दक्षिण भारतातील. या सर्व संस्कृतीचा काळ इ.स.पू. दुसरे सहस्रक व त्याच्या थोडा पुढे मागे असा आहे. याला अपवाद फक्त बलुचिस्तानच्या सरहद्दीनजीकच्या ⇨कुल्ली, झॉब या संस्कृतींचा असून त्या संस्कृती इ.स.पू. चौथ्या सहस्रकातील आहेत. परंतु भारतातील इतर समाजांशी त्यांचा सलग संबंध अद्याप प्रस्थापित झालेला नसल्याने व पश्चिम आशियातील नवाश्मयुगीन संस्कृतींशी त्यांचा जास्त निकटचा संबंध स्पष्टपणे दिसत असल्याने, त्यांना त्या क्षेत्रातील संस्कृतीच्या शाखा समजणे अधिक उचित ठरेल.

उत्तर भारताच्या वैशिष्ट्यपूर्ण अशा नवाश्मयुगीन संस्कृतीचा आढळ प्रामुख्याने काश्मीरमध्ये झेलमच्या खोऱ्यात झाला आहे. बूर्झाहोम येथील उत्खननांत गवसलेल्या अवशेषांवरून या समाजाच्या जीवनविकासाचे दोन टप्पे दिसतात. पहिल्यात, जमिनीत मोठाले खड्डे करून त्यांत वस्ती करण्यात येई. हे खड्डे सामान्यपणे तीन मी. व्यासाचे असून त्यांची खोली दीड ते चार मी. होती. यावर फांद्या व गवत यांचे छप्पर असावे. घासून धार लावलेली दगडी हत्यारे, हाडांचे टोचे, दाभण, राप्या व हातघडणीची मृत्पात्रे ही येथील सांस्कृतिक वैशिष्ट्ये होत. दुसऱ्या टप्प्यात, कच्च्या विटांची घरे बांधण्यात येऊ लागली. मृत्पात्रे घडविण्यासाठी चाकाचा वापर सुरू झाला. क्वचित तांब्याची हत्यारे सापडतात पण धातूच्या उपयोगाचे ज्ञान अगदी प्राथमिक स्वरूपाचे असावे. बी पेरण्याकरिता जमिनीत खळगे करण्यासाठी अणकुचीदार काठ्या वापरीत व त्या जोराने जमिनीत घुसाव्यात म्हणून त्यांभोवती दगडी कडी बसवीत. अशी वजने व दगडाचे विळ्यासारखे हत्यार सापडले आहे. यांवरून शेती करण्यात येई असा निष्कर्ष निघत असला, तरी हाडाच्या हत्यारांचे जे विविध प्रकार दिसतात त्यांवरून शिकारीलाच प्राधान्य असावे, असे दिसते. या काळातील काही थडग्यांत माणसांबरोबर कुत्रीही गाडलेली दिसतात. थडग्यातील सांगाड्यांवरून तेथील माणसांच्या वंशांची कल्पना येत नाही. जमिनीत खड्डे करून राहण्याची पद्धत व दगडी विळे यांवरून उत्तर भारतातील ही संस्कृती तत्कालीन चिनी नवाश्मयुगीन संस्कृतीशी संबद्ध असावी, असे मानता येते.

दुसरे क्षेत्र म्हणजे, ओरिसा, बिहार, आसाम या क्षेत्रांतील नवाश्मयुगीन संस्कृतीचे पूर्वक्षेत्र. गोल बुडाच्या दगडी कुऱ्हाडी, छिन्न्या व मुख्यत: चौकोनी खांद्यांच्या दगडी कुऱ्हाडी ही येथे सापडणारी वैशिष्ट्यपूर्ण आयुधे होत. या क्षेत्रातील निरनिराळ्या ठिकाणची मृत्पात्रे भिन्न प्रकारांची आहेत. येथे झालेले संशोधन पूर्ण कल्पना देण्यास पुरेसे नसले, तरी त्यातील विशिष्ट आयुधांवरून या संस्कृतीचा अन्यत्र जोडता येतो.

तिसरे क्षेत्र दक्षिण भारतातील नवाश्मयुगीन संस्कृतीचे. हे क्षेत्र उत्तर कर्नाटक व वायव्य आंध्र प्रदेश यांचे मिळून होणारे असून येथे मोठ्या प्रमाणावर उत्खनने करण्यात आली आहेत. त्यांपैकी ⇨ ब्रह्मगिरी, पिकलीहाल, टेक्कलकोटा ही महत्त्वाची होत. तेथे गोल वा चौकोनी आकाराच्या कुडाच्या घरांतून मानवी वस्ती होती. क्वचित वस्तीसाठी उंच अशा टेकड्यांवरील सपाट भागांचा उपयोग केलेला दिसतो. पहिल्या कालखंडात हातघडणीची राखी मृत्पात्रे वापरीत. दुसऱ्या कालखंडातील मृत्पात्रे तांबूस काळसर रंगाची आहेत. कोठेकोठे रंगीत नक्षीकाम केलेली मृत्पात्रेही या कालखंडात वापरलेली दिसतात. घासून गुळगुळीत केलेल्या कुर्‍हाडी, छिन्न्या यांसारख्या हत्यारांबरोबर दगडी पात्यांचा उपयोग मोठ्या प्रमाणावर करण्यात येत असे. दफनाची पद्धती अस्तित्वात असून मृताशेजारी त्याची आयुधे व भांडीही ठेवलेली आढळतात. या नवाश्मयुगीन संस्कृतीचा संबंध इतर भागांतील तत्सम संस्कृतींशी जोडण्याइतका प्रत्यक्ष पुरावा हाती नसला, तरी काही वैशिष्ट्यपूर्ण वस्तूंवरून, वर उल्लेखिलेल्या वायव्य भारतातील संस्कृतीप्रमाणेच ह्याचाही संबंध पश्चिम आशियातील नवाश्मयुगीनांशी असावा असे दिसते. तथापि निश्चित संबंध जोडता आलेले नाहीत, हे मान्यच करावयास हवे. वरील तिन्ही क्षेत्रांत पशुपालन व शेतकी हीच उपजीवविकेची प्रमुख साधने होती.

पहा : प्रागितिहास मृत्पात्रे मानववंश पुरावत्त्वीय उत्खनने.

संदर्भ : 1. Childe, Gordon, New Light on the Most Ancient East, London, 1958. 2. Clark, Grahame, World Prehistory–An Outline, Cambridge, 1961. 3. Clark,Grahame Piggott, Stuart, Prehistoric Societies, London, 1965. 4. Day, Michael M. Guide to Fossil Man, London, 1965. 5. Jacquetta, Hawkes Wooly, Leonard, Prehistory and the Beginnings of Civilization History of Mankind, Vol.1, London, 1963. 6. Leakey, L. S. B. Adam’s Ancestors, London, 1960. 7. Mate, M. S. Misra, V. N.Indian Prehistory, Poona, 1964, 1965. 8.Piggott, Stuart, Ed. The Dawn of Civilization, London, 1961. 9. Sankalia, H. D. Prehistory and Protohistory of India and Pakistan, Bambay, 1963. 10. Sankalia, H. D. Stone Age Tools, Poona, 1964. 11. Semenov, S. A. Trans. Thompson, M. W. Prehistoric Technology, London, 1964. 12. Singer, C.History of Technology, Vol. I, Oxford, 1954. 13. Stern Philip Van Doren, Prehistoric Europe, London, 1970.

देव, शां. भा. ढवळीकर, म. के.

 

प्रागैतिहासिक काल
 https://prachinandmordarnbharatitihas.blogspot.com/2022/04/blog-post_85.html
 1833 ई. में टर्नल ने प्रागैतिहासिक काल के लिए Age of Man शब्द का प्रयोग किया था। किन्तु 1851 ई. में डैनियल विलसन ने अपनी पुस्तक ‘‘The Archeology and Prehistoric Annals of Scotland ’’ में पहली बार प्रागैतिहास शब्द का प्रयोग किया। अतः प्रागैतिहासिक काल मानव के पृथ्वी पर प्रादुर्भाव से प्रारम्भ होकर 3000 ई.पू. तक माना जाता है। यह वह काल था जब मानव को लिपि का ज्ञान नहीं था अर्थात इस काल के लिखित प्रमाण उपलब्ध नहीं हैं। भारत के प्रमुख पुरातत्ववेत्ता एच.डी. सांकलिया के मतानुसार ‘‘लिपि ज्ञान के पूर्व किसी क्षेत्र, देष या राष्ट्र, मानव या जाति का इतिहास ही प्रागैतिहास है।
 
रागैतिहासिक काल का अर्थ
प्रागैतिहासिक काल का अर्थ प्रागैतिहासिक शब्द प्राग+इतिहास से मिलकर बना है जिसका शाब्दिक अर्थ है- इतिहास से पूर्व का युग । मानव प्रगति की कहानी के उस भाग को इतिहास कहते है जिसके लिये लिखित वर्णन मिलते है । परन्तु लेखन-कला के विकास के पहले भी मानव लाखों वर्षों तक पृथ्वी पर जीवन व्यतीत कर चुका था । इस काल में वह लिखने की कला से पूर्णतया अपरिचित था । यह लम्बा अतीत काल जब मनुष्य ने घटनाओं का कोई लिखित वर्णन नहीं रखा ‘प्रागैतिहास या प्रागैतिहासिक काल कहा जाता है ।  

प्रगैतिहासिक भारत को 4 भागों में विभक्त किया गया है :-
 
पूर्व पाषाण काल
मध्य पाषाण काल
उत्तर पाषाण काल
धातु पाषाण काल
1. पूर्व पाषाण काल
पूर्व पाषाण कालीन सभ्यता के केन्द्र दक्षिण भारत में मदुरा त्रिचनापल्ली, मैसूर, तंजौर आदि क्षेत्रों में इस सभ्यता के अवशेष मिले है । इस समय मनुष्य का प्रारंभिक समय था, इस काल में मनुष्य और जानवरों में विशेष अन्तर नहीं था । पूर्व पाषाण कालीन मनुष्य कन्दराओं, गुफाओं, वृक्षो आदि में निवास करता था । पूर्व पाषाण कालीन मनुष्य पत्थरों का प्रयोग अपनी रक्षा के लिये करता था । कुल्हाड़ी और कंकड के औजार सोहन नदी की घाटी में मिले है । सोहन नदी सिंधु नदी की सहायक नदी है। उसके पत्थर के औजार साधारण और खुरदुरे थे । 
 
इस युग में मानव शिकार व भोजन एकत्र करने की अवस्था में था । खानाबदोश जीवन बिताता था और उन जगहों की तलाश में रहता था, जहॉं खाना पानी अधिक मात्रा में मिल सके ।
2. मध्य पाषाण काल
मध्य पाषाण काल में पत्थर के औजार बनायें जाने लगे इस काल में कुल्हाडियों के अलावा, सुतारी, खुरचनी और बाण आदि मिले है । इस काल में मिट्टी का प्रयोग होने लगा था । पत्थरों में गोमेद, जेस्पर आदि का प्रयोग होता था । इस काल के अवशेष सोहन नदी, नर्मदा नदी और तुगमद्रा नदी के किनारे पाये गये ।
3. उत्तर पाषाण काल
हजारों वर्षो तक पूर्व पाषाण कालीन जीवन व्यतीत करने के बाद धीरे-धीरे मानव सभ्यता का विकास हुआ व उत्तर पाषाण काल का प्रारम्भ हुआ । इस काल में भी मानव पाषाणो का ही प्रयोग करता था, किन्तु इस काल में निर्मित हथियार पहले की अपेक्षा उच्च कोटि के थे । पाषाण काल का समय मानव जीवन के लिये विशेष अनुकूल था । इस काल के मनुष्य अधिक सभ्य थे । उनका जीवन सुख मय हो गया था । उन्होंने पत्थर व मिट्टी को जोड़कर दीवारे व पेड़ की शाखाओं व जानवरों की हड्डियों से छतों का निर्माण किया एवं समूहों में रहना प्रारम्भ कर दिया । मिट्टी के बर्तन, वस्त्र बुनना आदि प्रारम्भ कर दिया । हथियार नुकीले सुन्दर हो गये। इस काल के औजार सेल्ट, कुल्हाड़ियाँ, छेनियाँ, गदायें, मूसला, आरियाँ इत्यादि थे । 

उत्तर पाषाण कालीन लोग पत्थर को रगड़कर आग जलाने व भोजन पकाने की कला जानते थे । इस काल में धार्मिक भावनायें भी जागृत हुई । प्राकृतिक पूजा वन, नदी आदि की करते थे ।

नवपाषाण युग में मानव को खेती-बाड़ी का ज्ञान था । वह पशुपालन भी करता था। वह उच्च स्तर के चिकने औजार बनाता था । इस युग में मानव कुम्हार के चाक का उपयोग भी करता था । इस परिवर्तन और उन्नति को ‘‘नवपाषाण क्रान्ति’’ भी कहा जाता है ।
उत्तर पाषाण काल
4. धातु पाषाण काल
धातु यगु मानव सभ्यता के विकास का द्वितीय चरण था । इस युग में मनुष्य ने धातु के औजार तथा विभिन्न वस्तुयें बनाना सीख लिया था । इस युग में सोने का पता लगा लिया था एवं उसका प्रयोग जेवर के लिये किया जाने लगा । धातु की खोज के साथ ही मानव की क्षमताओं में भी वृद्धि हुई । हथियार अधिक उच्च कोटि के बनने लग गये । धातुकालीन हथियारों में चित्र बनने लगे। इस युग में मानव ने धातु युग को तीन भागों में बांटा गया:-
 
ताम्र युग
कांस्य युग
लौह युग
1. ताम्र युग- इस युग में ताबें का प्रयोग प्रारम्भ हुआ । पाषाण की अपेक्षा यह अधिक सुदृढ़ और सुविधाजनक था । इस धातु से कुल्हाड़ी, भाले, तलवार तथा आवश्यकता की सभी वस्तुयें तॉबे से बनाई जाने लगी । कृषि कार्य इन्ही औजारों से किया जाने लगा ।

2. कांस्य युग:- इस यगु में मानव ने तांबा और टिन मिलाकर एक नवीन धातु कांसा बनाया जो अत्यंत कठोर था । कांसे के औजार उत्तरी भारत में प्राप्त हुये इन औजार में चित्र भी थे । अनाज उपजाने व कुम्हार के चाक पर बर्तन बनाने की कला सीख ली थी । वह मातृ देवी और नर देवताओं की पूजा करता था । वह मृतकों को दफनाता था और धार्मिक अनुष्ठानों में विश्वास करता था । ताम्र पाषाण काल के लोग गांवों में रहते थे ।

3. लौह युग- दक्षिण भारत में उत्तर पाषाण काल के उपरान्त ही लौह काल प्रारम्भ हुआ। लेकिन उत्तरी भारत में ताम्रकाल के उपरान्त लौह काल प्रारम्भ हुआ । इस काल में लोहे के अस्त्र शस्त्रों का निर्माण किया जाने लगा । ताम्र पाषाण काल में पत्थर और तांबे के औजार बनाये जाते थे ।
5. प्रागैतिहासिक कला
प्रागैतिहासिक कला का पहला प्रमाण 1878 में इटली और फ्रांस में मिला। भारत में प्रागैि तहासिक गुफाएं  जिनकी चट्टानों पर चित्रकारी की हुई है, आदमबेटका, भीमबेटका, महादेव, उत्तरी कर्नाटक और आन्ध्र प्रदेश के कुछ भागों में पाई जाती है । दो पत्थर की चट्टान जो चित्रित है, बुर्जहोम में भी पाई गई । इस समय के चित्र प्रतिदिन के जीवन से सम्बन्धित थे । हाथी, चीता, गैंडा और जंगली सूअर के चित्र मिले, जिन्हें लाल, भूरे और सफेद रंगो का प्रयोग करके दिखाया गया है । कुछ चित्रों को चट्टानों को खुरेद कर बनाया गया है। प्रागैतिहासिक काल के चित्र शिकार के है, जिनमें पशुओं की आकृति एवं शिकार करते हुये दिखाया गया है ।

प्रागैतिहासिक कला
आरम्भिक पुरापाषण युग की हाथ की कुल्हाड़ियाँ तथा चीरने फाड़ने के औजार

प्रागैतिहासिक कला
प्रागैतिहासिक काल

 ताम्रपाषाणयुग
April 18, 2022
 ताम्रपाषाणयुग













ताम्रपाषाणयुग हा मानवी सांस्कृतिक इतिहासात नवाश्मयुगानंतर आलेला सांस्कृतिक कालखंड होय. तांब्याचा शोध लागून त्याचा वापर सुरू झाला, तरी पाषाणाची लहान आकाराची शस्त्रे मानवाने वापरात ठेवलीच, म्हणून या काळाला ताम्रपाषाणयुग अशी संज्ञा दिली गेली आहे. नवाश्मयुगाची सुरुवात व शेवट यांची प्रक्रिया जगाच्या निरनिराळ्या भागांत निरनिराळ्या काळी झाली, त्याप्रमाणे ताम्रपाषाणयुगाची सुरुवातही सर्वत्र समकालीन आढळत नाही.

अ‍ॅनातोलियात ब्रॉंझ अथवा ताम्रपाषाणयुगाची प्राचीनता इ.स.पू. सातवे सहस्रक इतकी मागे नेता येते, तर ग्रीस, क्रीट, मेसोपोटेमिया, ईजिप्त या प्रदेशात इ.स.पू. तिसरे सहस्रक, पू. यूरोपात इ.स.पू. तिसऱ्या सहस्रकाचा मध्यकाळ, इंग्लंडमध्ये इ. स.पू. सुमारे १९००, ात इ.स.पू. २५००, तर चीनमध्ये इ.स.पू. सुमारे १८०० या काळांत ताम्रपाषाणयुगीन संस्कृती प्रचलित होत्या; असे आढळून आले आहे.

काही पुरातत्त्वज्ञ ताम्रयुग आणि ब्रॉंझयुग अशी वेगवेगळी युगे कल्पितात; परंतु ही कल्पना सर्वमान्य झालेली नाही. तांब्यात काही प्रमाणात नैसर्गिक रीत्याच कथिल असते. ब्रॉंझ म्हणजे तांबे व कथिल यांचे मिश्रण, तेव्हा ताम्रयुग व ब्रॉंझ युग असे वेगवेगळे सांस्कृतिक कालखंड कल्पिता येत नाहीत. या उलट मानव मुद्दाम तांब्यात कथिलाचे मिश्रण करू लागला, तेव्हा कथिलाचे प्रमाण अशा मिश्रणात नैसर्गिक तांब्यात असणाऱ्या कथिलाच्या प्रमाणापेक्षा जास्त आढळून येत असल्याने ताम्रयुग व ब्रॉंझयुग हे वेगवेगळे कालखंड मानावेत; असे काही तज्ञ म्हणतात. या जाणीवपूर्वक केलेल्या मिश्रणामुळे तांब्याला टणकपणा येऊन नैसर्गिक तांब्यापेक्षा साच्यात ओतल्यावर जास्त सफाई येते. नैसर्गिक तांबे टणक नसते. असे असले, तरी कच्चे तांबे ठोकून त्यापासून लहानसहान वस्तू बनविण्याची कला अ‍ॅनातोलिया व इराणमध्ये जवळजवळ सात हजार वर्षांपूर्वी प्रचलित होती. तांबे शुद्ध करणे व साच्यात घालून वस्तू बनविणे या प्रक्रिया सुमेर आणि ईजिप्तमध्ये इ.स.पू. तिसऱ्या सहस्रकाच्या शेवटी रूढ झाल्याचे दिसते.

नैसर्गिक तांबे प्राचीन काळी अनेक ठिकाणी उपलब्ध होते. ईजिप्त, आशिया, मायनर, मेसोपोटेमिया, पॅलेस्टाइन, डॅन्यूबचे खोरे आणि राजस्थान (भारत) या विविध प्रदेशांत ते आढळून आल्याने ताम्रपाषाण संस्कृतीच्या त्या त्या भागांतील लोकांनी त्याचा उपयोग करून घेतला; परंतु हे साठे संपताच त्यांना खनिजमिश्र तांब्याचे साठे शोधावे लागले. खनिज तांबे उष्णतेच्या साहाय्याने शुद्ध करून घेण्याचे तंत्र यामुळे आत्मसात करावे लागले. या तंत्राचा वापर इ.स.पू. ३००० च्या आसपास पश्चिम आशियातील लोक करीत होते.

नवाश्मयुगाचा शेवट व ताम्र/ब्रॉंझ–पाषाणयुगाची सुरुवात हे सांस्कृतिक व तांत्रिक उत्क्रमण हळूहळू होत गेले. ईजिप्तमधील बॅदारियन आणि अम्रेशियन संस्कृतीचे लोक पाषाणाच्या हत्यारांबरोबरच तांब्याच्या लहान नळ्या व मासे पकडायचे गळ वापरीत. या वस्तू नैसर्गिक तांब्यापासून बनविल्या जात. खनिज तांबे शुद्ध करण्याचे ज्ञान या लोकांना नव्हते. याउलट मेसोपोटेमियात टेल हलाफ व ओबेद येथील ताम्रपाषाण संस्कृतीचे लोक शुद्ध तांब्याचे मणी व मासेमारीचे गळ वापरीत. स्यूसा (इराण) येथील रहिवासी कुऱ्हाडी, छिन्न्या, आरसे व सुया यांसारख्या प्रगत तंत्राच्या वस्तू बनवीत. ईजिप्तचे फेअरो राजे सिनाई वाळवंटातून तांबे आणवीत, अ‍ॅसिरियन लोक ते अ‍ॅनातोलियातून आणवीत. यूरोपात इ.स.पू. १६०० पासून खनिज तांब्याच्या खाणी उपयोगात आणल्या गेल्या.

ताम्रपाषाणयुगात व्यापारउदीम वाढला, त्याचप्रमाणे धातूकामात प्रावीण्य मिळविलेल्यांचा वर्ग निर्माण झाला. तांबट अन्नोत्पादनाच्या कामात सहभागी न होता, आपल्या धातुविद्येतच प्रावीण्य मिळवू लागले. तांबे शुद्ध करून साच्यात ओतणे ही क्रिया सोपी नसल्याने ही एक तंत्रशाखाच निर्माण झाली व कालांतराने अशा तज्ञ तांबटांचे संघ अथवा श्रेणी निर्माण झाल्या. तत्कालीन समाजाला अशा तंत्रज्ञांकरता धान्योत्पादन करावे लागे. एवढेच नव्हे, तर ज्या प्रदेशातून कच्चे तांबे आणून या तांबटांना विविध वस्तू बनविण्यासाठी द्यावयाचे, त्या प्रदेशांतील लोकांनाही तांब्याच्या बदली धान्य द्यावे लागे. त्यामुळे धान्योत्पादन वाढवावे लागले. या गरजेपोटी ताम्रपाषाणयुगात नांगराचा व चाकाचा शोध लागला. नांगरामुळे विस्तृत जमीन लागवडीखाली आणता आली व चाकामुळे दळणवळण जलद व सुलभ झाले. यामुळे ताम्रपाषाणयुगात नगरांचा उदय झाला, मानवी जीवन स्थिर व जास्त सुखी झाले आणि विविध कलांचा उगम झाला. क्रीटमधील मिनोअन संस्कृती, ग्रीसमधील मायसीनियन संस्कृती व इजीअन बेटांतील सायक्लॅडिक संस्कृती ताम्रपाषाणयुगीन संस्कृतीच्या नागरीकरणाची साक्ष देतात. भारतातील सिंधू संस्कृती ताम्रपाषाणयुगातच अंतर्भूत केली जाते. कारण तांब्याच्या विविध वस्तूंबरोबरच चर्ट दगडाची धारदार पातीही हे लोक वापरत होते.

भारतीय उपखंडात सिंध, पंजाब, राजस्थान, गुजरात, मध्य प्रदेश इ. प्रदेशांत ताम्रपाषाणयुगीन सिंधू अथवा हडप्पा संस्कृतीचे पुरावे मिळाले आहेत. मोहें–जो–दडो व हडप्पा यांव्यतिरिक्त सिंधमध्ये कोटदिजी, राजस्थानात कालिबंगा, गुजरातमध्ये लोथल व पंजाबमध्ये रूपड ही या संस्कृतींची महत्त्वपूर्ण स्थळे ठरली आहेत.

सिंधू संस्कृतिव्यतिरिक्त भारतात मध्य प्रदेश, गुजरात–महाराष्ट्र, कर्नाटक, उत्तर प्रदेश, पंजाब व काश्मीर एवढ्या विस्तृत प्रदेशांत ताम्रपाषाण संस्कृतीच्या लोकांनी वसती केल्याचा पुरावा गेल्या पंचवीस वर्षांत उपलब्ध झाला. मात्र सिंधू संस्कृति सोडता, या इतर प्रादेशिक संस्कृती नागरी स्वरूपाच्या नाहीत. पांढऱ्या रंगात चित्रकाम असलेली काळी आणि तांबडी मृत्पात्रे, दगडगोट्यांची व मातीची घरे आणि तांब्याचे शुद्धीकरण करून त्यापासून वस्तू बनविण्याची कला ही वैशिष्ट्ये असलेली राजस्थानातील बनास अथवा आहाड संस्कृती; गोल आणि काटकोन चौकोनी घरे, तांब्याच्या कुऱ्हाडी व तलवारी, गारगोटींच्या छिलक्यांचे हत्यारे, गहू, वाल, उडीद इ. धान्यांची लागवड आणि अत्यंत मनोहर चित्रण असलेली निरनिराळ्या आकारांची मृत्पात्रे ही वैशिष्ट्ये असलेली मध्य प्रदेशातील माळवा संस्कृती; टणक भाजणी, लाल पृष्टभागांवर काळ्या रंगात नक्षी काढलेली तोटीची मडकी, वाडगे व कळशा असे आकार असलेली मृत्पात्रे, मृत मुलाचे दोन मडक्यात व प्रौढांचे रांजणात दफन, गारगोटींच्या छिलक्यांची व तांब्याची हत्यारे, गहू व बार्ली यांची लागवड व त्यासाठी पाटबंधाऱ्याची योजना ही वैशिष्ट्ये असलेली महाराष्ट्राची जोर्वे संस्कृती; या सर्व ताम्रपाषाणयुगीन आहेत, या संस्कृतीचा नाश इ.स. पू. १००० च्या सुमारास झाला. याच सुमारास भारतात लोखंडाचा वापर सुरू झाला.

 
 
https://prachinandmordarnbharatitihas.blogspot.com/2022/04/blog-post_18.html
पाषाणयुग
postsaambhar :: लक्ष्मण काटेकर @ 7588020886


ताम्र पाषाण युग
ताम्रपाषाणयुग हा मानवी सांस्कृतिक इतिहासात नवाश्मयुगानंतर आलेला सांस्कृतिक कालखंड होय. तांब्याचा शोध लागून त्याचा वापर सुरू झाला, तरी पाषाणाची लहान आकाराची शस्त्रे मानवाने वापरात ठेवलीच, म्हणून या काळाला ताम्रपाषाणयुग अशी संज्ञा दिली गेली आहे. नवाश्मयुगाची सुरुवात व शेवट यांची प्रक्रिया जगाच्या निरनिराळ्या भागांत निरनिराळ्या काळी झाली, त्याप्रमाणे ताम्रपाषाणयुगाची सुरुवातही सर्वत्र समकालीन आढळत नाही.

अ‍ॅनातोलियात ब्रॉंझ अथवा ताम्रपाषाणयुगाची प्राचीनता इ.स.पू. सातवे सहस्रक इतकी मागे नेता येते, तर ग्रीस, क्रीट, मेसोपोटेमिया, ईजिप्त या प्रदेशात इ.स.पू. तिसरे सहस्रक, पू. यूरोपात इ.स.पू. तिसऱ्या सहस्रकाचा मध्यकाळ, इंग्लंडमध्ये इ. स.पू. सुमारे १९००, ात इ.स.पू. २५००, तर चीनमध्ये इ.स.पू. सुमारे १८०० या काळांत ताम्रपाषाणयुगीन संस्कृती प्रचलित होत्या; असे आढळून आले आहे.

काही पुरातत्त्वज्ञ ताम्रयुग आणि ब्रॉंझयुग अशी वेगवेगळी युगे कल्पितात; परंतु ही कल्पना सर्वमान्य झालेली नाही. तांब्यात काही प्रमाणात नैसर्गिक रीत्याच कथिल असते. ब्रॉंझ म्हणजे तांबे व कथिल यांचे मिश्रण, तेव्हा ताम्रयुग व ब्रॉंझ युग असे वेगवेगळे सांस्कृतिक कालखंड कल्पिता येत नाहीत. या उलट मानव मुद्दाम तांब्यात कथिलाचे मिश्रण करू लागला, तेव्हा कथिलाचे प्रमाण अशा मिश्रणात नैसर्गिक तांब्यात असणाऱ्या कथिलाच्या प्रमाणापेक्षा जास्त आढळून येत असल्याने ताम्रयुग व ब्रॉंझयुग हे वेगवेगळे कालखंड मानावेत; असे काही तज्ञ म्हणतात. या जाणीवपूर्वक केलेल्या मिश्रणामुळे तांब्याला टणकपणा येऊन नैसर्गिक तांब्यापेक्षा साच्यात ओतल्यावर जास्त सफाई येते. नैसर्गिक तांबे टणक नसते. असे असले, तरी कच्चे तांबे ठोकून त्यापासून लहानसहान वस्तू बनविण्याची कला अ‍ॅनातोलिया व इराणमध्ये जवळजवळ सात हजार वर्षांपूर्वी प्रचलित होती. तांबे शुद्ध करणे व साच्यात घालून वस्तू बनविणे या प्रक्रिया सुमेर आणि ईजिप्तमध्ये इ.स.पू. तिसऱ्या सहस्रकाच्या शेवटी रूढ झाल्याचे दिसते.

नैसर्गिक तांबे प्राचीन काळी अनेक ठिकाणी उपलब्ध होते. ईजिप्त, आशिया, मायनर, मेसोपोटेमिया, पॅलेस्टाइन, डॅन्यूबचे खोरे आणि राजस्थान (भारत) या विविध प्रदेशांत ते आढळून आल्याने ताम्रपाषाण संस्कृतीच्या त्या त्या भागांतील लोकांनी त्याचा उपयोग करून घेतला; परंतु हे साठे संपताच त्यांना खनिजमिश्र तांब्याचे साठे शोधावे लागले. खनिज तांबे उष्णतेच्या साहाय्याने शुद्ध करून घेण्याचे तंत्र यामुळे आत्मसात करावे लागले. या तंत्राचा वापर इ.स.पू. ३००० च्या आसपास पश्चिम आशियातील लोक करीत होते.

नवाश्मयुगाचा शेवट व ताम्र/ब्रॉंझ–पाषाणयुगाची सुरुवात हे सांस्कृतिक व तांत्रिक उत्क्रमण हळूहळू होत गेले. ईजिप्तमधील बॅदारियन आणि अम्रेशियन संस्कृतीचे लोक पाषाणाच्या हत्यारांबरोबरच तांब्याच्या लहान नळ्या व मासे पकडायचे गळ वापरीत. या वस्तू नैसर्गिक तांब्यापासून बनविल्या जात. खनिज तांबे शुद्ध करण्याचे ज्ञान या लोकांना नव्हते. याउलट मेसोपोटेमियात टेल हलाफ व ओबेद येथील ताम्रपाषाण संस्कृतीचे लोक शुद्ध तांब्याचे मणी व मासेमारीचे गळ वापरीत. स्यूसा (इराण) येथील रहिवासी कुऱ्हाडी, छिन्न्या, आरसे व सुया यांसारख्या प्रगत तंत्राच्या वस्तू बनवीत. ईजिप्तचे फेअरो राजे सिनाई वाळवंटातून तांबे आणवीत, अ‍ॅसिरियन लोक ते अ‍ॅनातोलियातून आणवीत. यूरोपात इ.स.पू. १६०० पासून खनिज तांब्याच्या खाणी उपयोगात आणल्या गेल्या.

ताम्रपाषाणयुगात व्यापारउदीम वाढला, त्याचप्रमाणे धातूकामात प्रावीण्य मिळविलेल्यांचा वर्ग निर्माण झाला. तांबट अन्नोत्पादनाच्या कामात सहभागी न होता, आपल्या धातुविद्येतच प्रावीण्य मिळवू लागले. तांबे शुद्ध करून साच्यात ओतणे ही क्रिया सोपी नसल्याने ही एक तंत्रशाखाच निर्माण झाली व कालांतराने अशा तज्ञ तांबटांचे संघ अथवा श्रेणी निर्माण झाल्या. तत्कालीन समाजाला अशा तंत्रज्ञांकरता धान्योत्पादन करावे लागे. एवढेच नव्हे, तर ज्या प्रदेशातून कच्चे तांबे आणून या तांबटांना विविध वस्तू बनविण्यासाठी द्यावयाचे, त्या प्रदेशांतील लोकांनाही तांब्याच्या बदली धान्य द्यावे लागे. त्यामुळे धान्योत्पादन वाढवावे लागले. या गरजेपोटी ताम्रपाषाणयुगात नांगराचा व चाकाचा शोध लागला. नांगरामुळे विस्तृत जमीन लागवडीखाली आणता आली व चाकामुळे दळणवळण जलद व सुलभ झाले. यामुळे ताम्रपाषाणयुगात नगरांचा उदय झाला, मानवी जीवन स्थिर व जास्त सुखी झाले आणि विविध कलांचा उगम झाला. क्रीटमधील मिनोअन संस्कृती, ग्रीसमधील मायसीनियन संस्कृती व इजीअन बेटांतील सायक्लॅडिक संस्कृती ताम्रपाषाणयुगीन संस्कृतीच्या नागरीकरणाची साक्ष देतात. भारतातील सिंधू संस्कृती ताम्रपाषाणयुगातच अंतर्भूत केली जाते. कारण तांब्याच्या विविध वस्तूंबरोबरच चर्ट दगडाची धारदार पातीही हे लोक वापरत होते.

भारतीय उपखंडात सिंध, पंजाब, राजस्थान, गुजरात, मध्य प्रदेश इ. प्रदेशांत ताम्रपाषाणयुगीन सिंधू अथवा हडप्पा संस्कृतीचे पुरावे मिळाले आहेत. मोहें–जो–दडो व हडप्पा यांव्यतिरिक्त सिंधमध्ये कोटदिजी, राजस्थानात कालिबंगा, गुजरातमध्ये लोथल व पंजाबमध्ये रूपड ही या संस्कृतींची महत्त्वपूर्ण स्थळे ठरली आहेत.

सिंधू संस्कृतिव्यतिरिक्त भारतात मध्य प्रदेश, गुजरात–महाराष्ट्र, कर्नाटक, उत्तर प्रदेश, पंजाब व काश्मीर एवढ्या विस्तृत प्रदेशांत ताम्रपाषाण संस्कृतीच्या लोकांनी वसती केल्याचा पुरावा गेल्या पंचवीस वर्षांत उपलब्ध झाला. मात्र सिंधू संस्कृति सोडता, या इतर प्रादेशिक संस्कृती नागरी स्वरूपाच्या नाहीत. पांढऱ्या रंगात चित्रकाम असलेली काळी आणि तांबडी मृत्पात्रे, दगडगोट्यांची व मातीची घरे आणि तांब्याचे शुद्धीकरण करून त्यापासून वस्तू बनविण्याची कला ही वैशिष्ट्ये असलेली राजस्थानातील बनास अथवा आहाड संस्कृती; गोल आणि काटकोन चौकोनी घरे, तांब्याच्या कुऱ्हाडी व तलवारी, गारगोटींच्या छिलक्यांचे हत्यारे, गहू, वाल, उडीद इ. धान्यांची लागवड आणि अत्यंत मनोहर चित्रण असलेली निरनिराळ्या आकारांची मृत्पात्रे ही वैशिष्ट्ये असलेली मध्य प्रदेशातील माळवा संस्कृती; टणक भाजणी, लाल पृष्टभागांवर काळ्या रंगात नक्षी काढलेली तोटीची मडकी, वाडगे व कळशा असे आकार असलेली मृत्पात्रे, मृत मुलाचे दोन मडक्यात व प्रौढांचे रांजणात दफन, गारगोटींच्या छिलक्यांची व तांब्याची हत्यारे, गहू व बार्ली यांची लागवड व त्यासाठी पाटबंधाऱ्याची योजना ही वैशिष्ट्ये असलेली महाराष्ट्राची जोर्वे संस्कृती; या सर्व ताम्रपाषाणयुगीन आहेत, या संस्कृतीचा नाश इ.स. पू. १००० च्या सुमारास झाला. याच सुमारास भारतात लोखंडाचा वापर सुरू झाला 
भाग १ 
पोस्तसांभार ::
अश्मयुग : लक्ष्मण काटेकर @ 7588020886


मानवी इतिहासातील अतिप्राचीन कालखंड. हा सु. पाच लाख ते दहा हजार वर्षापूर्वीपर्यंत साधारणत: मानण्यात येतो. सर्वसाधारणपणे माणसाला लेखनकला अवगत होण्यापूर्वीच्या इतिहासास प्रागितिहास म्हणतात. प्रागैतिहासिक काळापैकी एका सांस्कृतिक अवस्थेस, म्हणजे जेव्हा प्रामुख्याने दगडाचाच उपयोग हत्यारांसाठी केला जात होता त्या काळास ‘अश्मयुग’ असे म्हटले जाते. यात मानवास कोणताही धातू व धातूचा जाणीवपूर्वक उपयोग माहीत नव्हता. प्रागितिहासाचा जवळजवळ चारपंचमांश भाग अश्मयुगानेच व्यापला आहे. अश्मयुगातील मानव त्याच्या भोवती असणाऱ्या लाकडे, हाडे, दगड इत्यादींचा उपकरणे व हत्यारे बनविण्यासाठी उपयोग करीत होता. त्यांपैकी लाकूड व हाडे सहज नाश पावणारी असल्याने या पदार्थांची आयुधे वा उपकरणे मानवी वस्त्यांच्या अवशेषांत सहसा आढळत नाहीत. मात्र दगड टिकाऊ असल्याने त्याची उपकरणे व आयुधे पुष्कळ सापडतात. यावरूनच या कालखंडास ‘अश्मयुग’ असे नाव देण्यात येते.

अश्मयुगातील माणूस सर्वत्र एकाच प्रकारची आयुधे वापरीत होता किंवा एकाच पद्धतीचे जीवन व्यतीत करीत होता असे समजणे चुकीचे ठरेल. स्थलकालपरत्वे वेग व दिशा भिन्न असल्या तरी त्याच्या जीवनात प्रगती निश्चितच होती. ही मानवी प्रगती दर्शविण्यासाठी अश्मयुगाचे पुराणाश्मयुग, मध्याश्मयुग किंवा आंतराश्मयुग आणि नवाश्मयुग असे तीन मुख्य टप्पे कल्पिण्यात आले आहेत. त्यांतही पुराणाश्मयुगाचे पूर्व- पुराणाश्मयुग, मध्यपुराणाश्मयुग आणि उत्तरपुराणाश्मयुग असे पुन्हा तीन उपविभाग पाडले आहेत. या सर्व संज्ञा मुख्यतः यूरोपातील संशोधनांतून उत्पन्न झाल्या. इतर खंडांत प्रागैतिहासिक संशोधनाचा विकास सुरू झाल्यावर असे दिसू लागले, की तेथील प्रगतीची स्तबके काहीशी भिन्न असून वरील संज्ञा त्यांना चपखलपणे लागू पडत नाहीत. नवाश्मयुगापूर्वी पूर्व, मध्य व उत्तर अशी तीनच अश्मयुगे कल्पावी असे आफ्रिका, अमेरिका व भारत येथील काही पुरातत्त्वज्ञ समजत. परंतु स्थलविशेषामुळे उत्पन्न झालेल्या पारिभाषिक संज्ञांचा आशय अद्यापही निश्चित झालेला नाही. म्हणून सर्वत्र यूरोपीय संज्ञाच वापरण्यात आल्या आहेत.

अश्मयुगाच्या उपर्युक्त विभागांची सांस्कृतिक वैशिष्ट्ये स्थूलमानाने पुढीलप्रमाणे होत. यांच्या कालमर्यादांत स्थलभेदानुसार फरक आहेत.

भाग २
अश्मयुगीन कालखंड





पूर्वपुराणाश्मयुग : याचा काळ सामान्यपणे पाच लाख ते दीड लाख वर्षांपूर्वीपर्यंतचा समजण्यात येतो. काही भूप्रदेशांत दहा हजार वर्षांपूर्वीपर्यंत हीच सांस्कृतिक अवस्था चालू होती. या काळात ग्युंझचा (पहिल्या हिमयुगाचा) आरंभ, येथपासून ते रिसच्या (तिसऱ्या हिमयुगाच्या) पहिल्या चरणापर्यंतचा भूस्तरीय काळ समाविष्ट होतो. अत्यंत कडाक्याची थंडी आणि तीव्र उष्णता असे विषम हवामान आणि तेही वारंवार बदलणारे, त्यामुळे पृथ्वीवरील वनस्पतिजीवनात मोठे फेरफार होत गेले. वृक्षराजी, दाट जंगले व गवताळ प्रदेश यांचे पट्टे उत्तर-दक्षिण असे सरकत राहिले. त्यामुळे जीवसृष्टीही बदलत गेली. आता नष्ट झालेले, सरळ दातांचे भीमगज व तत्सम इतर प्राणी, तसेच पाणघोडे, गेंडे, अस्वले, गवे, सांबरे, घोडे, हरणे असे कितीतरी प्राणी मानवाच्या अवतीभोवती वावरत होते. या प्राण्यांची शिकार हेच प्रमुख उपजीविकेचे साधन होते. वंशशास्त्रदृष्ट्या ज्याचा उल्लेख करता येणार नाही, पण तत्सदृश असे ऑस्ट्रेलोपिथेकस (Australopithecus), पिथेकॅन्थ्रापस (Pithecanthropus) व निअँडरथल (Neanderthal) हे मानवसदृश प्राणी पृथ्वीवर वावरत होते. पण त्यांचा वावर भूपृष्ठाच्या एकपंचमांश क्षेत्रापुरताच मर्यादित होता. अमेरिका व ऑस्ट्रेलिया या खंडांत जवळजवळ वस्ती नव्हतीच. सांस्कृतिक दृष्ट्या या माणसांचे पाच गट पाडण्यात येतात. ते असे : व्हिलाफ्रांकिअन (Villafranchian)–पहिल्या हिमयुगाच्या पहिल्या चरणात अबेव्हिलिअन (Abbevillian)–पहिल्या आंतरहिमयुगाच्या पहिल्या चरणात क्लॅक्टोनियन (Clactonian)–पहिल्या आंतरहिमयुगाच्या दुसऱ्या व तिसऱ्या चरणांत अश्यूलियन (Acheulian)–दुसऱ्या आंतरहिमयुगाच्या प्रथमार्धात व लेव्हालेइशियन (Levalloisian)–दुसऱ्या आंतरहिमयुगाच्या उत्तरार्धापासून पुढे. तंत्रविशेषां- वरून समजांचे वरील गट पाडण्यात आले आहेत. त्यामध्ये वांशिक भेद अभिप्रेत नाहीत. पूर्वपुराणाश्मयुगातील दगडी आयुधांत प्रामुख्याने तीन तंत्रे वा तंत्रप्रकार दिसतात. पहिला हातकुऱ्हाडीचा असून त्यात गोट्याच्या दोन्ही बाजूंचे टवके उडवून हत्यारे करण्यात येत. यांत बदामी आकाराचे टोकदार हत्यार हे प्रमुख होते. यावरूनच त्यास हातकुऱ्हाडतंत्र हे नाव पडले. दुसरा प्रकार म्हणजे कोयत्यासारखे किंवा खाटकाच्या सुऱ्या- सारखे तुकडे तोडणारे दगड व तत्सम हत्यारे निर्माण करण्याचे तंत्र होय आणि तिसरा प्रकार दगडी छिलक्यांपासून वरील दोन्ही प्रकारची उपकरणे तयार करणे हा होता. पहिल्या प्रकारचे तंत्र यूरोप, आफ्रिका, पश्चिम आशिया येथे, तर दुसरे तंत्र चीन व आग्नेय आशिया यांत आढळते आणि तिसरे तंत्र प्रथम पॅलेस्टाइन व पुढे वायव्य भारतात दिसते. कालांतराने ते इतरत्रही पसरले.
भाग ३  
पोस्तसांभार :: लक्ष्मण काटेकर @ 7588020886




मध्यपुराणाश्मयुग: यात पन्नास हजार ते पंचवीस हजार वर्षांपूर्वीचा सर्वसाधारण काळ येतो. तिसऱ्या आंतरहिमयुगाचा उत्तरार्ध आणि व्यूर्मची ( Wurm–चौथ्या हिमयुगाची ) सुरुवात, हे काळ ह्यात समाविष्ट होतात. ह्या काळातील हवामान अतिशीत असल्यामुळे क्वचित अधूनमधून जंगले आढळत. मात्र ह्या काळात उत्तर यूरोपात खुरट्या वनस्पतींचा प्रदेश होता. त्यात गुहांच्या आश्रयाने राहणारे केसाळ गवे, अस्वले, रान- बैल व गेंडे हे मुख्य प्राणी असत. या काळात यूरोप व पश्चिम आशिया या भागांत निअँडरथल मानवाची वस्ती होती. तो मुख्यत्वे गुहांतून वा प्रस्तरालयांतून राहत असे. त्यांतील काही गुहांतून चित्रकाम सापडले आहे. मौस्टेरियन (यूरोप) व लीव्हाल्लॉइसो-मौस्टेरियन (पश्चिम आशिया) हे ह्या काळातील दोन प्रमुख समाजगट होत. त्यांची हत्यारे लहान आकाराची, वाटोळी पण धारदार आणि वैशिष्ट्यपूर्ण होती. ती गोरगोटी दगडांच्या छिलक्यांची केलेली असत. ह्याशिवाय इतर उपकरणांत तासण्या, टोचे, बाणांच्या टोकासारखे लहान हत्यार यांचाही समावेश असे.

उत्तरपुराणाश्मयुग : हा काळ सर्वसाधारणपणे पंचवीस हजार ते दहा वर्षांपूर्वीपर्यंतचा समजण्यात येतो. या काळाचा आरंभ चाळीस हजार वर्षांपूर्वी झाला असावा, असेही एक मत प्रसृत आहे. यूरोपपुरता हा काळ निश्चित असून, चौथ्या हिमयुगात जी तीन हिमप्रसरणे झाली त्यांतील पहिल्या व दुसऱ्या प्रसरणांच्या मधल्या काळात मध्य यूरोप वा दक्षिण रशिया येथे याचा उदय झाला. ह्या काळातील हवा थंड असल्याने या भागातही खुरट्या वनस्पती आढळत. रेनडिअरसारख्या प्राण्यांचे कळप त्यामुळे सर्वत्र वावरत होते. तसेच भीमगजा- सारखे काही काही प्राणी दक्षिण यूरोपात होते. वंशशास्त्रज्ञ ज्याला ‘होमो सॅपियन’ असे नाव देतात त्याच्या क्रोमॅग्नन व कोम्ब कापेल ब्रून मानव ह्या दोन शाखा यूरोपात सर्वत्र पसरल्या होत्या. होमो सॅपियनला पूर्णार्थाने मानव समजण्यात येते. पश्चिम आशियातही ही संस्कृती दिसून येते. इतर खंडांतील या संस्कृतीचे अस्तित्व व स्वरूप याबाबत तज्ञांत एकमत नाही. पेरीगोर्डियन किंवा ऑरिग्नेशियन, सॉल्यूट्रीअन, मग्डलेनिअन हे मुख्य समाजगट त्या वेळी अस्तित्वात होते. नैसर्गिक गुहांचा निवासासाठी मोठ्या प्रमाणावर वापर केला जाई. त्यांत काही ठिकाणी चित्रकाम आढळले आहे. पारलौकिक जीवन आणि अतिमानुषी शक्ती यांसंबंधी येथे विचार असावा इतका पुरावा मृतात्म्यासंबंधीची थडगी व विधी ह्यांमधून ज्ञात होतो. गारगोटीच्या दगडाची पातळ व सरळ पाती असलेली संयुक्त आयुधे बनविण्यात येऊ लागली. पानाच्या आकाराची बाणाची टोके, तासण्या, टोचे (Awl-Burin) ही विशिष्ट आयुधेही ह्या काळात वापरात होती. लाकूड व शिंगे यांचाही हत्यारांच्या निर्मितीसाठी वाढता उपयोग करण्यात येऊ लागला होता.

भाग ४ 
पोस्तसांभार :: लक्ष्मण काटेकर @ 7588020886






आंतराश्मयुग : ह्याचा पंधरा हजार वर्षांपूर्वी आरंभ होऊन दहा हजार वर्षांपूर्वी त्याचे पूर्ण प्रगल्भावस्थेत रूपांतर झाले. तथापि त्याचे अस्तित्व अत्यंत मर्यादित होते. चौथ्या हिमयुगाच्या तिसऱ्या प्रसरणाच्या काळात ह्यास सुरुवात झाली. थंड हवेऐवजी पर्जन्यमानात हळूहळू वृद्धी होऊ लागली व त्यामुळे गवताळ जंगलांची वाढ झाली आणि जीवसृष्टी सध्यासारखी निर्माण झाली. क्रोमॅग्‍नन मानवाच्या वंशाचा सर्वत्र प्रसार झाला. त्याविषयीचा पुरावा यूरोप व पश्चिम आशिया या भागांत प्रामुख्याने आढळतो. इतर खंडांतील या विशिष्ट सांस्कृतिक स्तबकाचे स्वरूप व विस्तार यांविषयी फारशी माहिती ज्ञात नाही. अझिलियन, टार्डेनोइशिअन, ॲस्टुरियन, एर्टेबोल, पॅलेस्टाइन (यूरोप) नाटुफियन (उत्तर ईजिप्त) हे प्रमुख समाजगट येथे होत. मुख्यत: हे उघड्यावर वा तळ्यांच्या काठी कातडी तंबूंतून निवास करीत. मात्र त्यांपैकी काही गुहांतही राहत असावेत. काही भागांत जमिनीत बोगद्यासारखे खड्डे करून त्यांचा त्यांनी राहण्यासाठी उपयोग केला होता. ‘सूक्ष्मपाषण’ नावाने ओळखली जाणारी गारगोटीच्या दगडाची त्रिकोण, चंद्रकोर इ. विविध आकारांची पाती वापरून ते संयुक्त हत्यारे बनवीत. मांस व आपोआप उगवणाऱ्या धान्याचेही ते भक्षण करीत. ह्या काळात प्राणी माणसाळविण्यास आरंभ झाला असावा.
नवाश्मयुग : ह्या काळास इ.स.पू. आठ हजारांच्या पुढे आरंभ झाला. इ.स.पू. पाच हजारांच्या आसपास त्याची विशेष प्रगती झाली. त्या वेळी हवामान, प्राणी व वनस्पतिसृष्टी सध्यासारखीच होती. मानववंशही बहुधा आज असणारेच होते. बारीक दगडी पात्यांची उपकरणे, घासून गुळगुळीत व धारदार केलेल्या दगडी कुऱ्हाडी, छिन्न्या यांची निर्मिती व वापर ह्या काळात होऊ लागला. चीन व आग्नेय आशिया या भागांतील हत्यारांचे आकार भिन्न आहेत. या भागातील नवाश्मयुगीन संस्कृतीही अनेक दृष्ट्या पश्चिमेकडील तत्कालीन संस्कृतीपेक्षा भिन्न आहे. या वेळी गाय, बैल, डुक्कर, मेंढी व शेवटी शेवटी घोडा हे प्राणी माणसाळले होते. पशुपालन हा महत्त्वाचा व्यवसाय सुरू झाला होता. याबरोबरच धान्य पिकविण्याची विद्या मानवाला साध्य झाली असावी. या व्यवसायाचा आरंभ पॅलेस्टाइनमध्ये झाला असावा. कारण आतापर्यंत हाती आलेले याबाबतचे सर्वांत प्राचीन नवाश्मयुगीन अवशेष या भागातीलच आहेत. मानवास शेतीसाठी बराच काळपर्यंत एकाच ठिकाणी राहण्याची जरूर भासू लागली आणि त्यामुळे उपजीविकेला एक प्रकारची शाश्वती आली. म्हणून स्थिर स्वरूपाच्या वसाहतींना प्रारंभ होऊन पहिली खेडी निर्माण झाली. गवत, लाकूड, कच्च्या विटा, दगड यांनी ही घरे बांधलेली असत. काही भागांत (पूर्व आशिया) भूमिगत घरांचाही वापर होता. शेकडो वर्षांच्या वाटचालीतून ह्या स्थिरपद जीवनाचा लाभ झाला. त्या पायावरच नागरी संस्कृतीची कालांतराने उभारणी झाली. धातूंचा शोध लागल्यावर वरील प्रक्रियेला गती मिळाली आणि अश्मयुगाचा अस्तही होऊ लागला. अश्मयुगाचा अस्त प्रथम इ.स.पू. ३०००च्या सुमारास मेसोपोटेमिया व ईजिप्त या ठिकाणी झाला.


भाग  ५ 
पोस्तसांभार :: लक्ष्मण काटेकर @ 7588020886
मानवी जीवन

अन्न : मानवी जीविताच्या आद्य निकडींपैकी पहिली अन्न होय. अश्मयुगापैकी पहिल्या दोन खंडांतील मानवाचे मुख्य अन्न म्हणजे त्याच्या भोवताली वावरणारे प्राणी, थोड्याफार प्रमाणात फळेमुळे-वनस्पती. आपले भक्ष्य मिळविण्यासाठी मानवाला त्याच्या शरीरशक्तीपेक्षा बुद्धिबलाचा अधिक वापर करणे भाग होते. कारण भोवतालचे बहुतेक सर्व प्राणी त्याच्यापेक्षा ताकदवान, चपळ होते किंवा त्यांना निसर्गाकडून मिळालेली स्वरक्षणाची साधने मानवाला दूर ठेवण्यास पुरेशी होती. अशा स्थितीत माणसाने टाकलेले पहिले पाऊल म्हणजे गटागटाने शिकार करणे हे होय. अश्मयुगीन मानव ताकदीत भारी असणारा प्राणी कोंडीत पकडून त्यास दगड-धोंड्यांनी ठेचून मारी. पूर्वपुराणाश्मयुगात प्रचंड गवे व गेंडे अशा प्राण्यांना खड्ड्यात फसवून मारण्याची विद्या मानवाने हस्तगत केली होती. असे खड्डे व त्यांत फसलेल्या प्राण्यांची हाडे यूरोपात मिळाली आहेत. मात्र अग्नीचे ज्ञान झाल्यावर गुहांत विसावणाऱ्या श्वापदांना हुसकून बाहेर काढण्यासाठी त्याचा उपयोग केला जात असे. उत्तरपुराणाश्मयुगात रेनडिअर, सांबर, घोडे अशा वेगवान प्राण्यांचे कळप घेरून उंच अशा कड्याकडे वळविण्यात येत. भेदरलेली ही जनावरे धावण्याच्या वेगात कड्यावरून खाली पडत व तेथे थांबलेल्या शिकाऱ्यांच्या हातात ती अलगद सापडत. सांघिक शक्तीचे हे वेगवेगळे प्रयोग अन्नप्राप्तीच्या कामात माणसाला उपयुक्त ठरले. तद्वतच त्याची स्वत:ची संहारशक्ती नवनव्या आयुधांमुळे वाढत गेली. भाले, बोला, धनुष्यबाण इ. शस्त्रांमुळे स्वत: सुरक्षित राहूनही त्यास जास्त परिणामकारकपणे शिकार मिळवणे शक्य झाले. मच्छीमारीसाठी लहान होडगी आणि बांबूची प्रचंड टोपली यांचा उपयोग मानव आंतराश्मयुगात यूरोपमध्ये करीत होता. हाडांचे गळ, काटेरी बाण यांचाही उपयोग मासे व इतर जलचर प्राणी मारण्यास करण्यात येई.

आंतराश्मयुग व नवाश्मयुग यांच्या संधिकाळात मेंढ्या, गाई व इतर काही प्राणी माणसाळवून पाळण्याची विद्या मानवाने साधली. अशा प्राण्यांचे कळप बाळगण्यात येत व त्यांचा उपयोग प्रामुख्याने भक्षणासाठीच होत असे. पाळण्यात आलेले हे प्राणी तृणभक्षकच होते. त्यामुळे त्यांचे कळप घेऊन चराऊ कुरणांच्या शोधासाठी दूरदूर अंतरावर फिरणे त्यास आवश्यक झाले किंवा वर्षभर चारा असेल अशा ठिकाणी त्यास स्थायिक व्हावे लागले. पशुपालनाची ही अवस्था अगदी प्राथमिक असली, तरी तिची मुख्य फलनिष्पत्ती अन्नाची शाश्वती हीच होय.

याच्याच आसपास केव्हा तरी शेतीचा शोध लागला असावा. आरंभी मुद्दाम पेरण्यात आलेले धान्य म्हणजे गहू असावे. रानटी गव्हाच्या लोंब्या जमिनीवर पडतात, तेथे पुन्हा रोपे उगवतात, तेथेच नवा गहू येतो, हे जीवितचक्र माणसाच्या ध्यानात आले असावे. फळे, कंदमुळे गोळा करण्याचे काम मुख्यत: स्त्रियांकडे आले व हे निसर्गाचे चक्र प्रथम त्यांच्यात लक्षात आले असावे. कदाचित स्त्रियांनीच धान्य पेरण्यास आरंभ केला असावा. हा शेतीचा म्हणजे पर्यायाने नवाश्मयुगाचा आरंभ होय.

शिकार, मच्छीमारी, पशुपालन व नंतर शेती हे अश्मयुगीन माणसाचे क्रमश: मुख्य व्यवसाय होते. पुराणाश्मयुगात व आंतराश्मयुगात मात्र फक्त पहिले दोनच व्यवसाय होते. नवाश्मयुगात पशुपालन व शेती हे प्रधान व्यवसाय झाले, तरीही थोड्याफार प्रमाणात शिकार व मच्छीमारी होतच राहिली. त्याच्या जीविताच्या इतर शाखांचे स्वरूप बऱ्याच अंशी त्याच्या व्यवसायांवरून निश्चित झालेले दिसते.

अश्मयुगाच्या विविध अवस्थांत मानवी अन्नाचे रूपही पालटत गेले. पुराणाश्मयुगीन व आंतराश्मयुगीन माणसाच्या अन्नात सर्व प्रकारच्या लहानमोठ्या प्राण्यांचा आणि फळे व कंदमुळे यांचा समावेश होता. मोसमात व विशिष्ट प्रदेशात सापडणारे सर्व प्रकारचे लहान-मोठे प्राणी खाद्य होते इतकेच काय, फार जरूर वाटल्यास नरमांसभक्षणही होत असे. एरवी हरणे, डुकरे, हत्ती, भीमगज, अस्वले, घोडे हे प्राणी नित्याचे भक्ष्य होते. आंतराश्मयुगात याशिवाय मासे व इतर जलचर यांचा अन्नात समावेश झाला. या युगाच्या शेवटी शेळ्या-मेंढ्या, गायी-बैल यांसारख्या पाळीव जनावरांचे मांस हा आहाराचा एक भाग झाला. नवाश्मयुगात धान्या- बरोबरच मांसाहारही चालूच राहिला.

शेती करण्यास आरंभ झाल्यावर गहू, बार्ली, मका, ज्वारी, बाजरी, राय ही धान्य व वाटाणा, घेवडा, मूग, हरभरा व मसूर यांसारखी द्विदल धान्ये स्थलकालपरत्वे पिकविण्यात येऊ लागली. तेल मिळविण्या- साठी ऑलिव्हसारख्या फळांचा वापर आग्नेय स्पेनमधे होत असे. नासपती, सफरचंद, बोरे अशांसारखी फळेही या माणसाला उपलब्ध होती. पण त्यांची मुद्दाम लागवड केलेली नसे. पाळीव जनावरांत शेळ्या, गाई व डुकरे ही मुख्य असत. यांच्या मांसाचा खाण्यासाठी उपयोग होई. लामा, उंट, घोडा ही इतर पाळीव जनावरे वेळप्रसंगी भक्षणासाठी उपयोगी पडली, तरी मुख्यत्वे त्यांचा उपयोग वाहतुकीसाठीच होत असे.









भाग ६  
पोस्तसांभार :: लक्ष्मण काटेकर @ 7588020886
समाजरचना : अश्मयुगीन समाजरचनेविषयी उत्खननातून मिळणारा पुरावा अप्रत्यक्ष व अल्प आहे. मिळालेल्या अवशेषांवरूनच काही अनुमाने बांधावी लागतात. या अनुमानांना बळकटी आणण्यासाठी, आजच्या मानवसदृश प्राण्यांची वागणूक (गोरिला, चिंपांझी इ.) आणि आजही अत्यंत मागासलेल्या, रानटी परिस्थितीत राहणाऱ्या जमातींविषयीची माहिती यांचा उपयोग करून घ्यावा लागतो. हे सगळे करूनही अश्मयुगीन समाजव्यवस्थेसंबंधी अत्यंत त्रुटित अशीच माहिती उपलब्ध होते.

आधीच हे स्पष्ट करावयास पाहिजे, की वैचारिक देवघेवीचे मुख्य साधन जी भाषा, ती त्या कालखंडात केव्हा व कोणाकोणाला प्राप्त झाली होती, याविषयी काहीही निश्चित सांगता येत नाही. परंतु पूर्वविचार व योजना, तसेच पुरस्सर सामूहिक जीवन प्रचलित होते. त्यावरून असे काहीतरी माध्यम अस्तित्वात असावे हे नक्की. शिकार करणे हे एकट्या-दुकट्याचे काम नसून त्यासाठी सांघिक प्रयत्न जरूर होते. तेव्हा पहिल्या- पासूनच मानवाला गटात किंवा टोळीत राहावे लागले आहे. या गटास कोठल्या माणसांचा समावेश होत असावा व या गटाची रचना कशी असावी, हे प्रश्न विवाद्य आहेत. केवळ मूळ उद्देशाकडे लक्ष ठेवून विचार केला, तर कोणाही धडधाकट माणसाचा त्यात समावेश व्हावा व सगळ्यांत अनुभवी शिकाऱ्याच्या हुकमात सगळ्यांनी चालावे, ही सरळ उत्तरे आहेत. पण मानवी जीवनातील कोणताच प्रश्न इतका सरळ सुटत नाही. केवळ एखाद्या मोठ्या शिकारीला वा शिकारीच्या एखाद्या मोसमात माणसे एकत्र येण्याऐवजी काही शाश्वत असे ऐक्य आरंभापासून अधिक प्रचलित असावे व हे ऐक्य सामाजिक बंधासारखे असावे. रक्ताचे नाते असणारी माणसे एकेका गटात असावी आणि हा कौटुंबिक गट असावा. पण या वेळी ‘कुटुंब’ याचा नेमका काय अर्थ असावा, याचा उलगडा होत नाही. यात एकाच पित्याची प्रजा होती, की एकाच मातेची प्रजा होती? अश्म- युगीन स्त्रीमूर्ती व चित्रे यांवरून काही तज्ञ असा निष्कर्ष काढतात, की येथे मातृसावर्ण्य होते. अपत्यप्राप्तीतील मातेच्या कार्याची साक्षात कल्पना या समाजाला होती. परंतु इतर अनेक मागासलेल्या समाजांप्रमाणे, प्रजोत्पादनातील पुरुषाचा नेमका वाटा कोणता? याची कल्पना अश्मयुगीन समाजाला नसावी. म्हणून मातेला, म्हणजे स्त्रीला, अधिक महत्त्व असावे. या प्रश्नाची दुसरी बाजू अशी, की या समाजातील स्त्रीपुरुष- संबंधाविषयीही कसलीच माहिती उपलब्ध नाही. कदाचित आजही जे प्राणिसृष्टीत दिसते, त्याप्रमाणे त्या वेळी एक बलिष्ठ पुरुष असावा. त्याच्या चारपाच स्त्रिया व बाल्यावस्थेतील अपत्ये एवढ्यांचा कुटुंबात समावेश असणे स्वाभाविक होतो. नव्याने वयात येणाऱ्या स्त्रीपुरुषांना–विशेषत: पुरुषांना –या व्यवस्थेत सामावून घेणे हा नेहमीचा प्रश्न राहणार. मग हे तरुण, आपल्या अथवा शेजारच्या कुटुंबातील स्त्रियांना वश करून घेऊन, स्वतंत्र कुटुंबे स्थापतील. म्हणजे पितृ-किंवा मातृ-सावर्ण्य यांपैकी कोणतीही पद्धत प्रचलित असू शकेल. अशी कुटुंबे एकत्र येऊन त्यांचा पुढे गट निर्माण होत असे. व्यावहारिक गरज व स्त्रीपुरुषसंबंध या दोन्हींची अशी सांगड घातली जात असणे सुसंगत व संभाव्य ठरते. या एकेका गटाचे सर्व घटक तेथे असतीलच असे म्हणवत नाही. तथापि एखाद्या विशिष्ट प्रदेशात राहणारी काही कुटुंबे व्यावहारिक सोयींसाठी एकत्र गट करीत असतील. या गटाचे निष्ठास्थान रक्तसंबंध नसल्याने काही दृश्य चिन्ह असणे उपकारक ठरेल, म्हणून एखाद्या प्राण्याचा किंवा पक्ष्याचा, निशाणी वा गणचिन्ह म्हणून उपयोग होऊ लागला. गुहांच्या भिंतींवर अस्वले, गेंडे अशा प्राण्यांची जी चित्रे दिसतात ती गणचिन्हेच समजता येतील. अशा गटात तीसपासून साठापर्यंत माणसे असावीत. ही सगळी एकत्र राहत, तसेच त्यांचे खाणेपिणेही एकत्रच होत असे. शिकारीसाठी म्हणून एखादा विशिष्ट भूप्रदेश एकेका गटाने राखून ठेवलेला असण्याची शक्यता असावी.

गटातील माणसे कोणती कामे करीत होती, याचे अगदी स्थूलमानाने विवेचन करता येईल. शिकार हा प्रमुख व्यवसाय पुरुषमंडळी करीत, तर फळे, मुळे, कंद हे गोळा करण्याचे काम स्त्रिया व मुले यांजकडे असे. मांस भाजून खाण्यास आरंभ झाल्यावर तेही स्त्रियांचेचे काम झाले असावे. स्त्रीचे सगळ्यात महत्त्वाचे कार्य बालसंगोपन हे होय. मानवी अपत्य दोनतीन वर्ष पूर्णपणे परावलंबी असते हे ध्यानात घेतले म्हणजे बाल- संगोपनात स्त्रीला लागणाऱ्या वेळाची व श्रमाची सार्थ कल्पना येईल. दगडी हत्यारे व उपकरणे तयार करणे हे काम पुरुषांचे होते. पंचमहाभूते, वृक्ष, स्थलदेवता, मृतात्मे यांसारख्या अतिमानुषी शक्तींवर ताबा चालविणाऱ्या पुरोहिताचा व्यवसाय गटाचा नायक किंवा वयोवृद्ध स्त्री वा पुरुष यांपैकी कोणीही करीत असे.

उत्तरपुराणयुगातील व आंतराश्मयुगातील गुहांच्या भिंतींवरील चित्रे, त्यांत सापडणाऱ्या स्त्रीमूर्ती, हाडे व शिगें यांवरील कोरीवकाम, अशा कलावस्तूंची निर्मिती हा या कालखंडात प्रचलित झालेला आणखी एक व्यवसाय होय. यांतील बरीच चित्रे व मूर्ती धार्मिक विधींशी निगडित होत्या. तेव्हा त्यांची निर्मिती करणारी माणसे अर्थातच समाजाने पोसलेली असावीत, असे दिसते. याच काळात हत्यारांसाठी गारगोटीसारखे दगड वापरू लागले. हे दगड निरनिराळ्या गटांना पुरविणे हाही एक स्वतंत्र व्यवसाय उदयास आला असावा. उत्तरपुराणाश्मयुगीन व आंतराश्मयुगीन हत्यारे आकाराने लहान पण वैविध्यपूर्ण होती. ती तयार करण्यास विशेष कौशल्याची आवश्यकता असल्याने अशा कारागिरांना साहजिकच गटात स्वतंत्र स्थान व महत्त्व प्राप्त झाले असावे.

एकीकडे रक्तसंबंध आणि व्यावहारिक गरज यांमुळे निर्माण होणारे ऐक्य, दुसरीकडे स्त्रीपुरुषसंबंधातून उत्पन्न होणारे व व्यवसायप्रावीण्यापोटी उद्भवलेले ताण, यांच्या संघर्षातून समाजगट टिकविण्याची व्यवस्था काय असावी? या संदर्भात व्यवहारचातुर्य व औदार्य यांच्या जोडीला दंडशक्तीचीही गरज असली पाहिजे. ह्या दंडशक्तीचा वापर करण्याचे काम पुरोहिताकडे असावे. अतिमानुषी शक्तीवरील श्रद्धेचा उपयोग सामाजिक ऐक्य टिकविण्यास होत असे. याला परंपरा व रूढी यांचा चांगलाच आधार मिळत असावा.

नवाश्मयुगात उपजीविकेच्या साधनांत मूलभूत क्रांती घडून आली. पशुपालन अथवा शेती यांमार्गे होणारी अन्नप्राप्ती आणि शिकारीतून होणारी प्राप्ती यांत एक फार महत्त्वाचा फरक आहे. या भेदाचे परिणाम दूरगामी ठरले. शिकार मिळविण्यास फार तर एकदोन किंवा तीनचार दिवस जात, परंतु एकदा मेलेला प्राणी हाताशी आला, की लगेच खाता येई शिकार करणे हे काम सतत चालू असले, तरी त्यातून फलप्राप्ती जवळजवळ तत्काळ होत असे. आता मेंढ्या वा गुरांचे कळप बाळगावयाचे म्हणजे, गुरे वाढवावयास हवीत. शेतात धान्य पेरल्यानंतर प्रत्यक्ष धान्य हाती येईपर्यंत तीन ते सहा महिने इतका काळ वाट पाहत बसावयास पाहिजे. तसेच धान्य पेरण्याच्या आधी त्या जमिनीची मशागत केली पाहिजे. माणसाचे अवधान सतत त्याच गुरांच्या कळपावर पाहिजे, त्याच जमिनीच्या तुकड्यावर पाहिजे. यामुळे अधिकाधिक आपुलकी निर्माण झाली व तिचेच रूपांतर स्वामित्वाच्या भावनेत झाले. याचीच दुसरी बाजू अशी, की कळपातील गुरांपासून अन्न मिळणार ते त्यांची जोपासना करणाऱ्याला–दुसऱ्याला नव्हे. म्हणजे उपजीविकेच्या साधनांवर मालकी हक्काचा उदय झाला. आरंभी ही मालकी प्रत्येक गटाची सामूहिक होती. नंतर कुटुंब हा महत्त्वाचा दुवा झाला आणि शेवटी तेथे व्यक्ती आली. एकेका व्यकीच्या मालकीचे कळप किंवा शेतजमीन या वेळी नव्हती पण एकेका कुटुंबाच्या सर्वस्वी मालकीची स्थापना मात्र झालेली दिसते. याचे साधे कारण असे, की कोणाही व्यक्तीला अधिकार आणि कर्तव्य यांची सर्वांत फायदेशीर जोड कुटुंब या समूहाद्वारेच मिळण्यासारखी होती. जमिनी वर्षानुवर्षे टिकवून धरावयाच्या याचाच अर्थ वारसा म्हणून त्या मिळावयाच्या, तर तो अधिकार कोणाचा हे स्पष्ट करणे म्हणजे कुटुंब या संस्थेचे रूप नक्की ठरणे आवश्यक होते. नवाश्मयुगाच्या आरंभीच्या काळात पितृसावर्ण्य रूढ झाले. आता पुराणाश्मयुग व आंतराश्मयुग यांतल्यासारखी स्थिती राहिली नाही. या कालखंडातील माणसाला एकाच ठिकाणी स्थायिक होणे अत्यावश्यक झाले. केवळ पशुपालन व मेंढपाळी करणाऱ्या लोकांना चराऊ कुरणाच्या शोधार्थ थोडीशी भ्रमंती करावी लागत असली, तरी पशुपालन व शेती असे दोन्ही व्यवसाय करणारे लोक कायमचे एकत्र राहू लागले.

दगडाची हत्यारे करणे, त्याला आवश्यक ते दगडाचे प्रकार मिळविणे, थोड्याफार प्रमाणात शिकार करणे, तसेच पौरोहित्य, कलाकृती हे सर्व व्यवसाय पूर्वीप्रमाणेच आताही चालू राहिले. मात्र शेतकी आणि पशुपालन यांसंबंधीची तंत्रे अंगी आणणे जरुरीचे झाले. हेच सर्वसाधारण व्यवसाय असल्याने बहुतेक स्त्रीपुरुष यांत तरबेज झाले. आता नवीन व्यवसाय आले. घरे बांधणे, त्यासाठी सुतारकाम-गवंडीकाम आले वस्त्रे विणणे आणि नवाश्मयुगाच्या उत्तरार्धात मृत्पात्रे तयार करणे ह्याही गोष्टी आल्या. यांतील वेतकाम, बुरूडकाम यांसारखे काही पूर्वापार व्यवसाय होते. त्यांत वस्त्रे विणणे याची भर पडली. मृत्पात्रे तयार करणे, ती रंगविणे हे व्यवसाय स्त्रियाही करीत. सर्व लोक निरनिराळे व्यवसाय करीत होते. पण निरनिराळ्या उत्पादनांची गुणवत्ता पाहिल्यानंतर असे वाटते, की प्रावीण्य मिळविलेल्या माणसांचेच हे काम असले पाहिजे. म्हणजे व्यवसाय व त्यातील प्रावीण्य यांच्या अनुषंगाने समाजाची व्यावसायिक विभागणी झाली होती. असे कुशल कारागीर एकाच गावात राहत की इतर गावांत काम करीत, हे ज्ञात नाही. परंतु व्यावहारिक सोयीच्या दृष्टीने पाहिल्यास ते फिरते असण्याचा अधिक संभव वाटतो. फिरत्या कारागिरांच्या पाठोपाठ फिरते व्यापारीही आले असावेत. इतकी कुटुंबे कायमची एकत्र राहू लागली. गुरेढोरे, शेतजमिनी यांवर कौटुंबिक (खाजगी) मालकी निर्माण झाली. तंत्रज्ञांमुळे काही व्यवसायांवर एखाद्या कुटुंबाची वा माणसाची मक्तेदारी आली. म्हणजे साहजिकच संघर्ष-प्रसंगांची शक्यता वाढली. आतापर्यंत सामाजिक संघर्षाला पोषक असे घटक अश्मयुगीन समाजात नव्हते. अतिमानुषी शक्तीवर श्रद्धा, मृतात्मे, पुरोहित, वडीलधारी माणसे, परंपरा यांचे समाजावर नियंत्रण होतेच. परंतु आता दंडनीती आणि शासनसंख्या अत्यावश्यक झाली. याच संस्थेकडे समाजाचे व त्याच्या मालमत्तेचे बाह्यशत्रूकडून रक्षण करण्याचे दायित्वही आपोआप आले. अशी संस्था कोणत्याही स्वरूपाची असेल त्यावर वडिलधाऱ्या मंडळीची सभा, एक वयोवृद्ध वा अनुभवी पुढारी-धर्मगुरू (पुरोहित) प्रमुख म्हणून असावा.

शेवटी नवाश्मयुगीन समाज शाश्वत पायावर उभा राहून समाजरचनेत महत्त्वाचे बदल घडले आणि कुटुंब ही संस्था श्रेष्ठ ठरली. यातून नियंत्रणाची गरज निर्माण होऊन शासनसंस्थाही याच काळात उत्पन्न झाली असावी. तिचा आवाका लहान असला, तरी मूलभूत लक्षणे तेथून दृग्गोचर होऊ लागतात. या समाजा- च्या तंत्रज्ञानाविषयी बरीच माहिती उपलब्ध झाली आहे.






भाग ६  
पोस्तसांभार :: लक्ष्मण काटेकर @ 7588020886
समाजरचना : अश्मयुगीन समाजरचनेविषयी उत्खननातून मिळणारा पुरावा अप्रत्यक्ष व अल्प आहे. मिळालेल्या अवशेषांवरूनच काही अनुमाने बांधावी लागतात. या अनुमानांना बळकटी आणण्यासाठी, आजच्या मानवसदृश प्राण्यांची वागणूक (गोरिला, चिंपांझी इ.) आणि आजही अत्यंत मागासलेल्या, रानटी परिस्थितीत राहणाऱ्या जमातींविषयीची माहिती यांचा उपयोग करून घ्यावा लागतो. हे सगळे करूनही अश्मयुगीन समाजव्यवस्थेसंबंधी अत्यंत त्रुटित अशीच माहिती उपलब्ध होते.

आधीच हे स्पष्ट करावयास पाहिजे, की वैचारिक देवघेवीचे मुख्य साधन जी भाषा, ती त्या कालखंडात केव्हा व कोणाकोणाला प्राप्त झाली होती, याविषयी काहीही निश्चित सांगता येत नाही. परंतु पूर्वविचार व योजना, तसेच पुरस्सर सामूहिक जीवन प्रचलित होते. त्यावरून असे काहीतरी माध्यम अस्तित्वात असावे हे नक्की. शिकार करणे हे एकट्या-दुकट्याचे काम नसून त्यासाठी सांघिक प्रयत्न जरूर होते. तेव्हा पहिल्या- पासूनच मानवाला गटात किंवा टोळीत राहावे लागले आहे. या गटास कोठल्या माणसांचा समावेश होत असावा व या गटाची रचना कशी असावी, हे प्रश्न विवाद्य आहेत. केवळ मूळ उद्देशाकडे लक्ष ठेवून विचार केला, तर कोणाही धडधाकट माणसाचा त्यात समावेश व्हावा व सगळ्यांत अनुभवी शिकाऱ्याच्या हुकमात सगळ्यांनी चालावे, ही सरळ उत्तरे आहेत. पण मानवी जीवनातील कोणताच प्रश्न इतका सरळ सुटत नाही. केवळ एखाद्या मोठ्या शिकारीला वा शिकारीच्या एखाद्या मोसमात माणसे एकत्र येण्याऐवजी काही शाश्वत असे ऐक्य आरंभापासून अधिक प्रचलित असावे व हे ऐक्य सामाजिक बंधासारखे असावे. रक्ताचे नाते असणारी माणसे एकेका गटात असावी आणि हा कौटुंबिक गट असावा. पण या वेळी ‘कुटुंब’ याचा नेमका काय अर्थ असावा, याचा उलगडा होत नाही. यात एकाच पित्याची प्रजा होती, की एकाच मातेची प्रजा होती? अश्म- युगीन स्त्रीमूर्ती व चित्रे यांवरून काही तज्ञ असा निष्कर्ष काढतात, की येथे मातृसावर्ण्य होते. अपत्यप्राप्तीतील मातेच्या कार्याची साक्षात कल्पना या समाजाला होती. परंतु इतर अनेक मागासलेल्या समाजांप्रमाणे, प्रजोत्पादनातील पुरुषाचा नेमका वाटा कोणता? याची कल्पना अश्मयुगीन समाजाला नसावी. म्हणून मातेला, म्हणजे स्त्रीला, अधिक महत्त्व असावे. या प्रश्नाची दुसरी बाजू अशी, की या समाजातील स्त्रीपुरुष- संबंधाविषयीही कसलीच माहिती उपलब्ध नाही. कदाचित आजही जे प्राणिसृष्टीत दिसते, त्याप्रमाणे त्या वेळी एक बलिष्ठ पुरुष असावा. त्याच्या चारपाच स्त्रिया व बाल्यावस्थेतील अपत्ये एवढ्यांचा कुटुंबात समावेश असणे स्वाभाविक होतो. नव्याने वयात येणाऱ्या स्त्रीपुरुषांना–विशेषत: पुरुषांना –या व्यवस्थेत सामावून घेणे हा नेहमीचा प्रश्न राहणार. मग हे तरुण, आपल्या अथवा शेजारच्या कुटुंबातील स्त्रियांना वश करून घेऊन, स्वतंत्र कुटुंबे स्थापतील. म्हणजे पितृ-किंवा मातृ-सावर्ण्य यांपैकी कोणतीही पद्धत प्रचलित असू शकेल. अशी कुटुंबे एकत्र येऊन त्यांचा पुढे गट निर्माण होत असे. व्यावहारिक गरज व स्त्रीपुरुषसंबंध या दोन्हींची अशी सांगड घातली जात असणे सुसंगत व संभाव्य ठरते. या एकेका गटाचे सर्व घटक तेथे असतीलच असे म्हणवत नाही. तथापि एखाद्या विशिष्ट प्रदेशात राहणारी काही कुटुंबे व्यावहारिक सोयींसाठी एकत्र गट करीत असतील. या गटाचे निष्ठास्थान रक्तसंबंध नसल्याने काही दृश्य चिन्ह असणे उपकारक ठरेल, म्हणून एखाद्या प्राण्याचा किंवा पक्ष्याचा, निशाणी वा गणचिन्ह म्हणून उपयोग होऊ लागला. गुहांच्या भिंतींवर अस्वले, गेंडे अशा प्राण्यांची जी चित्रे दिसतात ती गणचिन्हेच समजता येतील. अशा गटात तीसपासून साठापर्यंत माणसे असावीत. ही सगळी एकत्र राहत, तसेच त्यांचे खाणेपिणेही एकत्रच होत असे. शिकारीसाठी म्हणून एखादा विशिष्ट भूप्रदेश एकेका गटाने राखून ठेवलेला असण्याची शक्यता असावी.

गटातील माणसे कोणती कामे करीत होती, याचे अगदी स्थूलमानाने विवेचन करता येईल. शिकार हा प्रमुख व्यवसाय पुरुषमंडळी करीत, तर फळे, मुळे, कंद हे गोळा करण्याचे काम स्त्रिया व मुले यांजकडे असे. मांस भाजून खाण्यास आरंभ झाल्यावर तेही स्त्रियांचेचे काम झाले असावे. स्त्रीचे सगळ्यात महत्त्वाचे कार्य बालसंगोपन हे होय. मानवी अपत्य दोनतीन वर्ष पूर्णपणे परावलंबी असते हे ध्यानात घेतले म्हणजे बाल- संगोपनात स्त्रीला लागणाऱ्या वेळाची व श्रमाची सार्थ कल्पना येईल. दगडी हत्यारे व उपकरणे तयार करणे हे काम पुरुषांचे होते. पंचमहाभूते, वृक्ष, स्थलदेवता, मृतात्मे यांसारख्या अतिमानुषी शक्तींवर ताबा चालविणाऱ्या पुरोहिताचा व्यवसाय गटाचा नायक किंवा वयोवृद्ध स्त्री वा पुरुष यांपैकी कोणीही करीत असे.

उत्तरपुराणयुगातील व आंतराश्मयुगातील गुहांच्या भिंतींवरील चित्रे, त्यांत सापडणाऱ्या स्त्रीमूर्ती, हाडे व शिगें यांवरील कोरीवकाम, अशा कलावस्तूंची निर्मिती हा या कालखंडात प्रचलित झालेला आणखी एक व्यवसाय होय. यांतील बरीच चित्रे व मूर्ती धार्मिक विधींशी निगडित होत्या. तेव्हा त्यांची निर्मिती करणारी माणसे अर्थातच समाजाने पोसलेली असावीत, असे दिसते. याच काळात हत्यारांसाठी गारगोटीसारखे दगड वापरू लागले. हे दगड निरनिराळ्या गटांना पुरविणे हाही एक स्वतंत्र व्यवसाय उदयास आला असावा. उत्तरपुराणाश्मयुगीन व आंतराश्मयुगीन हत्यारे आकाराने लहान पण वैविध्यपूर्ण होती. ती तयार करण्यास विशेष कौशल्याची आवश्यकता असल्याने अशा कारागिरांना साहजिकच गटात स्वतंत्र स्थान व महत्त्व प्राप्त झाले असावे.

एकीकडे रक्तसंबंध आणि व्यावहारिक गरज यांमुळे निर्माण होणारे ऐक्य, दुसरीकडे स्त्रीपुरुषसंबंधातून उत्पन्न होणारे व व्यवसायप्रावीण्यापोटी उद्भवलेले ताण, यांच्या संघर्षातून समाजगट टिकविण्याची व्यवस्था काय असावी? या संदर्भात व्यवहारचातुर्य व औदार्य यांच्या जोडीला दंडशक्तीचीही गरज असली पाहिजे. ह्या दंडशक्तीचा वापर करण्याचे काम पुरोहिताकडे असावे. अतिमानुषी शक्तीवरील श्रद्धेचा उपयोग सामाजिक ऐक्य टिकविण्यास होत असे. याला परंपरा व रूढी यांचा चांगलाच आधार मिळत असावा.

नवाश्मयुगात उपजीविकेच्या साधनांत मूलभूत क्रांती घडून आली. पशुपालन अथवा शेती यांमार्गे होणारी अन्नप्राप्ती आणि शिकारीतून होणारी प्राप्ती यांत एक फार महत्त्वाचा फरक आहे. या भेदाचे परिणाम दूरगामी ठरले. शिकार मिळविण्यास फार तर एकदोन किंवा तीनचार दिवस जात, परंतु एकदा मेलेला प्राणी हाताशी आला, की लगेच खाता येई शिकार करणे हे काम सतत चालू असले, तरी त्यातून फलप्राप्ती जवळजवळ तत्काळ होत असे. आता मेंढ्या वा गुरांचे कळप बाळगावयाचे म्हणजे, गुरे वाढवावयास हवीत. शेतात धान्य पेरल्यानंतर प्रत्यक्ष धान्य हाती येईपर्यंत तीन ते सहा महिने इतका काळ वाट पाहत बसावयास पाहिजे. तसेच धान्य पेरण्याच्या आधी त्या जमिनीची मशागत केली पाहिजे. माणसाचे अवधान सतत त्याच गुरांच्या कळपावर पाहिजे, त्याच जमिनीच्या तुकड्यावर पाहिजे. यामुळे अधिकाधिक आपुलकी निर्माण झाली व तिचेच रूपांतर स्वामित्वाच्या भावनेत झाले. याचीच दुसरी बाजू अशी, की कळपातील गुरांपासून अन्न मिळणार ते त्यांची जोपासना करणाऱ्याला–दुसऱ्याला नव्हे. म्हणजे उपजीविकेच्या साधनांवर मालकी हक्काचा उदय झाला. आरंभी ही मालकी प्रत्येक गटाची सामूहिक होती. नंतर कुटुंब हा महत्त्वाचा दुवा झाला आणि शेवटी तेथे व्यक्ती आली. एकेका व्यकीच्या मालकीचे कळप किंवा शेतजमीन या वेळी नव्हती पण एकेका कुटुंबाच्या सर्वस्वी मालकीची स्थापना मात्र झालेली दिसते. याचे साधे कारण असे, की कोणाही व्यक्तीला अधिकार आणि कर्तव्य यांची सर्वांत फायदेशीर जोड कुटुंब या समूहाद्वारेच मिळण्यासारखी होती. जमिनी वर्षानुवर्षे टिकवून धरावयाच्या याचाच अर्थ वारसा म्हणून त्या मिळावयाच्या, तर तो अधिकार कोणाचा हे स्पष्ट करणे म्हणजे कुटुंब या संस्थेचे रूप नक्की ठरणे आवश्यक होते. नवाश्मयुगाच्या आरंभीच्या काळात पितृसावर्ण्य रूढ झाले. आता पुराणाश्मयुग व आंतराश्मयुग यांतल्यासारखी स्थिती राहिली नाही. या कालखंडातील माणसाला एकाच ठिकाणी स्थायिक होणे अत्यावश्यक झाले. केवळ पशुपालन व मेंढपाळी करणाऱ्या लोकांना चराऊ कुरणाच्या शोधार्थ थोडीशी भ्रमंती करावी लागत असली, तरी पशुपालन व शेती असे दोन्ही व्यवसाय करणारे लोक कायमचे एकत्र राहू लागले.

दगडाची हत्यारे करणे, त्याला आवश्यक ते दगडाचे प्रकार मिळविणे, थोड्याफार प्रमाणात शिकार करणे, तसेच पौरोहित्य, कलाकृती हे सर्व व्यवसाय पूर्वीप्रमाणेच आताही चालू राहिले. मात्र शेतकी आणि पशुपालन यांसंबंधीची तंत्रे अंगी आणणे जरुरीचे झाले. हेच सर्वसाधारण व्यवसाय असल्याने बहुतेक स्त्रीपुरुष यांत तरबेज झाले. आता नवीन व्यवसाय आले. घरे बांधणे, त्यासाठी सुतारकाम-गवंडीकाम आले वस्त्रे विणणे आणि नवाश्मयुगाच्या उत्तरार्धात मृत्पात्रे तयार करणे ह्याही गोष्टी आल्या. यांतील वेतकाम, बुरूडकाम यांसारखे काही पूर्वापार व्यवसाय होते. त्यांत वस्त्रे विणणे याची भर पडली. मृत्पात्रे तयार करणे, ती रंगविणे हे व्यवसाय स्त्रियाही करीत. सर्व लोक निरनिराळे व्यवसाय करीत होते. पण निरनिराळ्या उत्पादनांची गुणवत्ता पाहिल्यानंतर असे वाटते, की प्रावीण्य मिळविलेल्या माणसांचेच हे काम असले पाहिजे. म्हणजे व्यवसाय व त्यातील प्रावीण्य यांच्या अनुषंगाने समाजाची व्यावसायिक विभागणी झाली होती. असे कुशल कारागीर एकाच गावात राहत की इतर गावांत काम करीत, हे ज्ञात नाही. परंतु व्यावहारिक सोयीच्या दृष्टीने पाहिल्यास ते फिरते असण्याचा अधिक संभव वाटतो. फिरत्या कारागिरांच्या पाठोपाठ फिरते व्यापारीही आले असावेत. इतकी कुटुंबे कायमची एकत्र राहू लागली. गुरेढोरे, शेतजमिनी यांवर कौटुंबिक (खाजगी) मालकी निर्माण झाली. तंत्रज्ञांमुळे काही व्यवसायांवर एखाद्या कुटुंबाची वा माणसाची मक्तेदारी आली. म्हणजे साहजिकच संघर्ष-प्रसंगांची शक्यता वाढली. आतापर्यंत सामाजिक संघर्षाला पोषक असे घटक अश्मयुगीन समाजात नव्हते. अतिमानुषी शक्तीवर श्रद्धा, मृतात्मे, पुरोहित, वडीलधारी माणसे, परंपरा यांचे समाजावर नियंत्रण होतेच. परंतु आता दंडनीती आणि शासनसंख्या अत्यावश्यक झाली. याच संस्थेकडे समाजाचे व त्याच्या मालमत्तेचे बाह्यशत्रूकडून रक्षण करण्याचे दायित्वही आपोआप आले. अशी संस्था कोणत्याही स्वरूपाची असेल त्यावर वडिलधाऱ्या मंडळीची सभा, एक वयोवृद्ध वा अनुभवी पुढारी-धर्मगुरू (पुरोहित) प्रमुख म्हणून असावा.

शेवटी नवाश्मयुगीन समाज शाश्वत पायावर उभा राहून समाजरचनेत महत्त्वाचे बदल घडले आणि कुटुंब ही संस्था श्रेष्ठ ठरली. यातून नियंत्रणाची गरज निर्माण होऊन शासनसंस्थाही याच काळात उत्पन्न झाली असावी. तिचा आवाका लहान असला, तरी मूलभूत लक्षणे तेथून दृग्गोचर होऊ लागतात. या समाजा- च्या तंत्रज्ञानाविषयी बरीच माहिती उपलब्ध झाली आहे.







भाग ७ 
पोस्तसांभार :: लक्ष्मण काटेकर @ 7588020886




वसतिस्थाने : अश्मयुगीन वसाहतींचे स्वरूपही वैविध्यपूर्ण होते. वसाहतींचा विचार करण्यापूर्वी फुटकळ निवासस्थानेच आधी पाहावयास पाहिजेत. निवासस्थानांचे स्वरूप तत्कालीन हवामानावर अवलंबून होते. त्यानुसार सामान्यपणे निवासांचे दोन प्रकार दिसतात. गुंफा वा प्रस्तरालय यांसारखी नैसर्गिक आणि झोपड्या किंवा तंबू यांसारखी कृत्रिम आवरणे निवासासाठी वापरीत. पुराणाश्मयुगातील पहिल्या दोन भागांत हवेतील तपमानाचे चढउतार तीव्र असल्याने, विशेषत: हिवाळा फारच कडक असल्याने, मानवाने गुंफांचा वा थोड्या पुढे झुकणाऱ्या कडेकपाऱ्यांचा आश्रय सर्वत्र केलेला होता. सर्व प्राचीन ज्ञात अशा गुहा चीनच्या जोकोत्येन (Chou-kou-tien) भागातच आढळल्या आहेत. त्यानंतरच्या गुहा यूरोपमधे दक्षिण फ्रान्स व उत्तर स्पेन, आशियात पॅलेस्टाइन व सिरिया आणि आफ्रिकेतील मोरोक्को येथे आढळतात. अल्जिरियाच्या भूमध्य सागरा- नजीकच्या प्रदेशात मध्याश्मयुगातील वस्त्यांचे अवशेष मिळाले आहेत. यांतील काही गुंफांत उत्तरपुराणाश्म- युगात वस्ती झाली, तर काहींत आंतराश्मयुगातही वस्ती होती. भारतातील मध्य प्रदेशातील गुहा आंतराश्म- युगीन आहेत, तर अमेरिकेतील गुहा सांस्कृतिक दृष्ट्या अश्मयुगाच्या विविध टप्प्यांतील आहेत. तरीसुद्धा त्या कालदृष्ट्या नजीकच्या आहेत. पण सर्व गुहांतील किंवा प्रस्तरालयांतील निवासांत काही समान विशेष दिसतात. निवासाला गुहा वा कपाऱ्या निवडताना त्यांची तोंडे वाऱ्याच्या दिशेला येणार नाहीत अशी काळजी घेतली जात असे. गुहांच्या तोंडाशी काही आडोसे असलेच, तरी त्यांविषयी विशेष माहिती मिळत नाही. गुहा बरीच खोल असेल, तर मुखाच्या भागातच वस्ती होई. तथापि फार खोलातली जागा टाळलेली दिसते. या आतल्या भागाचा चित्रकामाला वा काही पूजाअर्चा यांसारख्या विधींना उपयोग होत असावा. त्यांना ‘मंदिरे’ किंवा ‘पूजास्थाने’ अशीही नावे यामुळे दिली जातात. अत्यंत कडाक्याच्या हिवाळ्याला उतार पडल्याबरोबर तळी, नद्या यांच्या काठी माणसे उघड्यावरही राहत असतील, अशा काही ठिकाणी त्यांच्या अस्तित्वाचा निर्णायक पुरावा ⇨ ओल्हुवायी गॉर्ज (आफ्रिका) येथे मिळाला आहे. तेथे त्यांनी काही झोपड्या वा घरे बांधली. याविषयीच्या खाणाखुणांचा मात्र काहीच मागमूस आज लागत नाही. माणसाने उभारलेल्या आसऱ्या- चे स्पष्ट अवशेष उत्तरपुराणाश्मयुगातच प्रथम मिळतात. तेही एका विशिष्ट भागातच आणि एका विशिष्ट समाजगटाशी निगडित आहेत. आग्नेय यूरोपात चेकोस्लोव्हाकियात व्हिस्टोनीस, ऑस्ट्रोव्हा व पेट्रोव्हिज दक्षिण रशियात डॉन नदीवरील गागारिनो येथे व सायबेरियात टिमोनोव्हका येथे हे अवशेष मिळतात. पहिल्या दोघांचा संबंध ग्रेव्हॅटियन लोकांशी आहे आणि भीमगज या अजस्र प्राण्याची शिकार हाच त्यांचा मुख्य व्यवसाय असल्याने या लोकांना त्याच्या पाठोपाठ विरळ जंगलात येऊन राहणे भाग पडले. स्वाभाविकच त्यांनी काही आश्रयस्थाने बांधली. यांना घरे म्हणण्यापेक्षा तंबू वा झोपड्या म्हणणे अधिक सोयीचे ठरेल. वर्तुळाकार वा लंबवर्तुळाकार अशा रचनेच्या या झोपड्या आकाराने पुष्कळच मोठ्या असत (उदा., व्हिस्टोनीस : १५ मी. लांब व ९ मी. रुंद). यांवर झाडाच्या फांद्या तिरप्या एकमेकांना टेकून त्यांवर पाला, गवत वा कातडे पसरण्यात येत असे. जेथे सबंध छप्पर कातडी एकमेकांना जोडून तंबूसारखे करीत, तेथे ताण देण्यासाठी मोठाले घोडे वा भीमगजाचे सुळे त्यांच्या कडेवर ठेवलेले दिसतात. छप्पर जमिनीवरच टेकत असल्याने भिंतीची गरजच नव्हती. परंतु एखाद्या ठिकाणी, विशेषतः जमीन उतरती असल्यास, दगडामातीची लहानशी भिंतही बांधण्याची विद्या त्यांना ज्ञात होती (व्हिस्टोनीस). भोवतालच्या जमिनीपेक्षा घराची जमीन खोलगट असे. जमिनीवर सपाट दगड अंथरून क्वचित फरशीही केलेली दिसते. मध्यभागी ओळीने चुलखंडे घातलेली असत– एका झोपडीत अशी पाच चुलखंडे आहेत. परिघानजीक खळगे करून साठवणाची व्यवस्था होई. टिमोनोव्हका (सायबेरिया) येथे उत्तरपुराणाश्मयुगात प्रचारात असलेल्या दुसऱ्या एका प्रकारच्या घरांचे अवशेष मिळाले आहेत. ही घरे कडाक्याच्या थंडीपासून बचाव करण्यासाठीच तयार केलेली असावीत, यात शंका नाही. यांना कृत्रिम गुंफा म्हटले तरी चालेल. त्यांच्या रचनेसाठी जमिनीत तीन मी. किंवा अधिकही खोल असा गोल खड्डा करण्यात येई. याचा व्यासही तेवढाच आहे. आत जाण्यासाठी जिना असे. वरच्या बाजूने मोठाली लाकडी आडवाटे वा बांबू टाकून त्यावर गवत, पाला व चिखल थापून छप्पर तयार करीत. साधारणपणे जिन्यानजीक किंवा झोपडीच्या (खड्ड्याच्या) बाहेर उघड्यावर चुली पेटविण्यात येत. चीनमधील शान्सी प्रांतात तसेच भारतात काश्मीरमध्ये ⇨ बुर्झाहोम येथे अशा प्रकारची घरे सापडली आहेत. मात्र दोन्ही ठिकाणी ती नवाश्मयुगातीलच आहेत. परंपरेच्या सातत्याची कल्पना देण्यासाठी त्यांचा येथे उल्लेख केला आहे. आंतराश्मयुगीन निवासांची सर्व माहिती बव्हंशी यूरोपातूनच मिळालेली आहे. पुराणाश्म- युगाच्या मानाने हवामान बरेच उष्ण असल्याने गुहांतून वा प्रस्तरालयांतून राहण्याची किंवा खड्ड्यासारख्या घरांतून राहण्याची आता जरूर नव्हती. त्यामुळे वर्षभर उघड्या मैदानावर आता राहता येऊ लागले. स्वाभाविकच घर बांधण्याची विद्या आता प्रगत झाली. या प्रगतीला मुख्य हातभार कशाचा लागला असेल, तर तो माणसाच्या जीविताला लाभलेल्या स्थैर्याचा. विशेषतः नद्यांच्या वा तलावांच्या आसपास बारमास मासळी मिळू लागली. तेव्हा येथे राहणे आवश्यक झाले. या वेळेपर्यंत जंगलाची वाढही झालेली होती व लाकडाचा सफाईने उपयोग करता येऊ लागला. परिणामी जास्त टिकाऊ व प्रशस्त घरे या काळात रूढ झाली. घर बांधण्यासाठी वाळवंटी (कोरडी) किंवा थोड्या उंचवट्यावरची जमीन निवडण्यात येऊ लागली. कोरडी जमीन मिळाली नाही, तर तीवर फांद्या, पालापाचोळा, झाडाच्या साली अंथरीत (जर्मनी–लूबेक इंग्लंड–स्टारकार) व त्यावर माती पसरून कोरड्या जमिनी तयार करीत. घरे सामान्यतः गोल व लंबगोल आराखड्याची असत. लाकडी (फांद्यांच्या) भिंती व तशीच छपरे असत. क्वचित कातडी छप्परही असे. घर उभे करताना कोठे कोठे दगडांचा वापरही केला आहे. आतापर्यंतच्या काळात सहसा न आढळणारी एक गोष्ट आता दिसू लागते ती म्हणजे घरांचे समूह. इंग्लंडमध्ये सरे परगण्यात किंवा डेन्मार्क-हॉलंडमध्ये असे समूह अनेक ठिकाणी आढळतात. मात्र ही सगळी घरे एकाच वेळी वापरात होती का पुन्हापुन्हा नव्याने बांधीत याविषयी निश्चित माहिती नाही. कारण गृहसमूहांना आनुषंगिक अशा रस्ते किंवा सरंक्षणयोजना कोठेच दिसत नाहीत. त्या पुढे आल्या.
जीविताच्या इतर शाखांप्रमाणे याही क्षेत्रात नवाश्मयुगात क्रांतिकारक बदल झालेले दिसतात. नव्या जीवनपद्धतीत स्थिर वस्ती ही समाजाची गरज झाल्याने जास्त टिकाऊ निवासस्थाने आवश्यक झाली. स्वाभाविकच चिवट व बळकट सामान कौशल्याने वापरण्यात येऊ लागले. लव्हाळे, बांबू, कातडी यांच्या ऐवजी आता मोठाले लाकडी ओंडके, दगड, कच्च्या विटा यांचा उपयोग होऊ लागला. नवाश्मयुगीन निवासस्थानांत स्थलकालपरत्वे खूपच वैविध्य आढळते. घरांचा आराखडा आता गोल, चौरस वा आयत अशा आकारांचा झाला. मध्याश्मयुगातही भिंत हा घटक फारसा कोठे आढळत नाही. आता बांबूच्या-वेताच्या तट्ट्यापासून, दगड, कच्च्या विटा यांच्या बांधलेल्या अशा सगळ्या प्रकारच्या भिंती दिसून येतात. या भिंतींवर गिलावा करून त्यावर रंगकामही केलेले आढळते (जार्मो). भिंती भक्कम करण्यासाठी त्यांखाली दगडी जोती ठेवण्याच्या प्रथेचाही आरंभ झालेला दिसतो (जार्मो). भोवतालच्या जमिनीपेक्षा घराची जमीन थोडीशी खोलगट करण्याची प्रथा आताही बऱ्याच भागांत चालूच राहिली. छपराचे स्वरूप मुख्यत्वे बांधकामाची साहित्यपद्धती व पर्जन्यमान यांवरच अवलंबून राहिले. पावसाळी भागात लाकडी उतरती वा दगड-विटा यांची घुमटाकार व इतरत्र सपाट अशी छपरे इमारतींवर असत. ⇨जेरिको (पॅलेस्टाइन), खिरोकिटिया (सायप्रस), हसौना (उ. मेसोपोटेमिया) हे अवशेषांचे त्याबाबतचे नमुने होते. कालांतराने घरांमध्ये एकच दालन ठेवण्याऐवजी त्याच्या खोल्या पाडण्यात येऊ लागल्या. सायप्रसमधील खिरोकिटिया येथील वर्तुळाकार घरात पोटमाळा काढलेला होता. त्याला पक्क्या खांबांचा आधार होता, तरीही जिना मात्र पक्का नव्हता. तेथे साध्या शिडीचाच उपयोग केलेला असावा. उपलब्ध जागेच्या विभाजनाचा हा एक स्वतंत्र व फारसा रूढ न झालेला प्रकार. खोल्यांची कल्पना रुजल्यावर कित्येक ठिकाणी समोर ओवरी, त्यामागे एकापाठोपाठ एक अशा दोन खोल्या, अशीच मांडणी हलाफ (सिरिया) येथील अवशेषांवरून दिसते. यापुढे हसौना येथे एका उघड्या चौकाभोवती अनेक खोल्या मांडलेल्या दिसतात. सर्व खोल्यांना हवा व उजेड पोचण्यास ही योजना उपयुक्त होती, तसेच सगळ्यांभोवती एक मोठी भिंत असल्याने सगळे घर सुरक्षित राही. आर्पाकिया (उत्तर इराक) या ठिकाणी घरांची थोडी निराळी रचना सापडते. वर्तुळाकार रचनेचीच ही थोडी सुधारलेली आवृत्ती असावी. या घराचे दोन भाग दिसतात. एक वर्तुळाकार दालन व त्याच्या समोर आयता- कार दालन दिसते. या दालनाला प्रवेशद्वार असावयाचे. पण हा आराखडा अपवादात्मक होय. एरवी गृह-

रचनेच्या विद्येतील सर्व मूलभूत घटक–वास्तुसाहित्य, वास्तुरचना, तंत्र, वास्तुविधान व सुशोभन–नवाश्म- युगीनांनी आत्मसात केलेले दिसते. वास्तुविद्येची ही सर्व प्रगती मुख्यत्वे पॅलेस्टाइन, तुर्कस्तान, इराक या भागांत व भूमध्य समुद्रातील काही बेटांत झाली, हे ध्यानात घ्यावयास हवे. कारण साधारणत: याच भागात नवाश्मयुगीन संक्रमण सिद्धीस पोचले असावे, असे समजतात.

यूरोप, चीन, भारत व ईजिप्त या ठिकाणी नवाश्मयुगीनांनी बांधलेली घरे बरीचशी निराळी आहेत. यूरोप- मध्ये गृहरचनेस लाकडाचाच उपयोग होत गेला. आयताकार वा चौरस घरे भक्कम लाकडी किंवा बांबूच्या सांगाड्याभोवती बांधीत. भिंती आणि बहुधा छपरेही फळ्यांची केलेली असत. क्वचित त्यांवर गवत पसरीत (फेडर्झे, कोलोन-लिंडन्थॉल), ईजिप्तमध्ये ⇨ फायूम येथे बांबू व तट्ट्या यांच्या झोपड्या वापरीत असावेत असे दिसते. यानंतरच्या मेरिम्डीयन समाजाने अशा झोपड्यांची छपरे घुमटाकार बनवून त्यांवर चिखल थापण्यास आरंभ केला. चीन व भारत या दोन्ही ठिकाणी सामान्यपणे लाकूड व गवत यांच्या वर्तुळाकार वा चौकोनी झोपड्या वापरलेल्या दिसतात (टेक्कलकोटा). क्वचित प्रस्तरालयाचाही आश्रय केलेला होता. परंतु चीनच्या शान्सी व भारताच्या काश्मीर भागात खड्ड्यांत केलेली घरे या काळात वापरीत.

आंतराश्मयुगात काही ठिकाणी पाचसात घरांचे समूह दिसले, तरी त्या वेळी ग्राम या कल्पनेचा जन्म झाला नव्हता. नवाश्मयुगात बरीच माणसे कायमची एका ठिकाणी राहणार, म्हणजे बरीच घरे एकमेकांशेजारी बांधली जाणार, असे झाल्यावर या सहवासाचा अर्थ व त्यातील प्रश्न समजावयास लागले. या माणसांना ये-जा करण्यास मार्ग हवेत, म्हणजे रस्ते हवेत. नवाश्मयुगातील बर्‍याच मोठ्या कालखंडात रस्ता ही कल्पना ज्ञात नव्हती. दोन घरांच्या मध्ये उरणाऱ्या जागेतूनच दळणवळण चाले. हे सोयीचे करण्याचे प्रयत्न क्वचित काही ठिकाणी झालेले दिसतात. आर्पाकिया येथे अशा वाटांवर दगड अंथरले होते, तर खिरोकिटिया येथे मुख्य रस्त्यावर फरसबंदी केलेली होती. परंतु ही उदाहरणे अपवादात्मक होत. यूरोपातील काही वसाहतींत (फेडर्झे) घरे एका ओळीत बांधून मध्यभागी हेतुत: रस्ते ठेवलेले दिसतात. इतरत्र अशी योजनापूर्वक मांडणी सापडत नाही. वाहने नसल्याने खेड्यांना एकमेकांशी जोडणारे रस्ते निर्माण होण्याची शक्यताच नव्हती. खेड्यांच्या रक्षणासाठी काही बांधकाम करण्याची व्यवस्था नवाश्मयुगात प्रथम झाली. इ.स.पू. आठव्या सहस्रकात जेरिको येथे एक प्रचंड दगडी तटबंदी उभारण्यात आली होती. पण हेही एकुलते एकच उदाहरण आहे. नवाश्मयुगाच्या अगदी शेवटी शेवटी भूमध्य सागराभोवतालचा प्रदेश व पश्चिम आशिया या भागांतील काही ठिकाणी विटांच्या तटबंद्या बांधण्यात आल्या (मर्सीनू, हसितकार, ट्रॉय). उत्तर व मध्य यूरोपातील वसाहतींभोवती लाकडी तटबंद्या व खंदक आढळले आहेत (कोलोन-लिंडन्थॉल). फ्रान्समध्ये काही टेकड्यांच्या माथ्याभोवती असणाऱ्या दगडी भिंती याच काळातील समजतात. ही सर्व उदाहरणे फुटकळ आणि काळ व स्थळ या दोन्ही दृष्टींनी एकमेकांपासून दूरची आहेत. म्हणून ग्राम अस्तित्वात आले, तरी ग्राम-योजना व ग्राम-संरक्षण या कल्पनांचे आकलन झाले होते किंवा त्या रुजल्या होत्या, असे निश्चितपणे म्हणता येत नाही.

दळणवळणासाठी वाहने वापरली जात असल्याची शक्यता असली, तरी प्रत्यक्षात वाहने होती किंवा कसे आणि असल्यास त्यांचे स्वरूप काय असावे, हे सांगता येत नाही. प्राणी माणसाळविलेले असल्याने ओझे लादून नेण्यास वा बसून जाण्यास उपयोगी होत असावेत. उत्तरपुराणाश्मयुगात होड्या करता येऊ लागल्या होत्या. नदीत अगदी थोड्या अंतरावर जाऊन मच्छीमारीसाठी त्यांचा वापर होई. नवाश्मयुगात होड्या होत्याच. त्यांचा आकार थोडा वाढला होता. या काळाच्या शेवटी कदाचित शिडीही वापरण्याची विद्या मानवाला साध्य झाली असावी. मात्र ही प्रगती पूर्णपणे स्थानिक होती. ती नाईल नदीवरील प्रवासापुरतीच मर्यादित होती.


भाग ८
पोस्तसांभार :: लक्ष्मण काटेकर @ 7588020886
हत्यारे व आयुधे: आपल्या अंगातील नैसर्गिक शक्तीला भोवतालच्या पदार्थांची जोड देऊन स्वत:ला अधिक कार्यक्षम बनविणे हा कोणत्याही मानवी तंत्रज्ञानाचा प्राथमिक उद्देश असतो. अश्मयुगात मानवाने लाकडे, हाडे व मुख्यत: दगड यांचे साहाय्य घेतले. त्यापासून आपल्या उपयोगी पडतील अशी उपकरणे व आयुधे घडविण्यास त्याने आरंभ केला. किंबहुना उपकरणे व आयुधे वापरण्याची बुद्धी व ती तयार करण्याची शक्ती ही मानवाची व्यवच्छेदक लक्षणे समजावी लागतात. अश्मयुगातील तंत्रविषयक प्रगतीच्या दिशा पुढीलप्रमाणे होत : एखाद्या विशिष्ट कामाला विशिष्ट आकाराचीच उपलब्ध वस्तू (दगड) जास्त उपयोगी पडते ही जाणीव त्यास झाली. ही जाणीव एकाएकी प्राप्त न होता अनुभवातूनच उत्पन्न होते. त्यामुळे विशिष्ट आकाराच्याच दगडांची निवड करून, हव्या त्या आकारांचे दगड न मिळाल्यास, जे दगड हाताशी असतील त्यांना मनाजोगता आकार देण्यास त्याने सुरुवात केली.यासाठी दगडाचे टवके व तुकडे उडविणे व योग्य आकार देणे त्यास क्रमप्राप्तच होते. पूर्णपुराणाश्मयुगाच्या आरंभापासूनच येथपर्यंत त्याने मजल मारलेली दिसते.दगडाचा आकार जसा निवडता आला, तसाच त्याचा प्रकारही मानव निवडू लागला.ठिसूळ

दगडांचे आडवे कातळ निघू शकतात, हेही ज्ञान त्यास होऊ लागले. त्याचप्रमाणे तो उपकरण-प्रकाराला जास्त अनुकूल असा दगडाचा प्रकारच निवडू लागला. पुराणाश्मयुगाच्या मध्य व उत्तर खंडांत त्यास अशी पारख पूर्णत्वाने प्राप्त झालेली दिसेत. लहान आकाराचे छिलके व पाती यांसाठी चर्ट (Chert), ॲगेट (Agate) असे अत्यंत घट्ट व एकसंध पाषाणप्रकार त्याने निवडलेले दिसतात. निवडलेल्या पाषाणप्रकारांतून अपेक्षित आकार घडविण्याच्या पद्धतींत पुढे वैविध्य आले व प्रगती झाली. बदामी आकारचे व बहुविध उद्योगांचे ‘हातकुऱ्हाड’ नावाचे हत्यार तयार करण्याच्या दोन पद्धतींवरून हा मुद्दा जास्त स्पष्ट होईल. अबेव्हिलियन पद्धतीत दगडाचे मोठाले टवके उडवीत, त्यामुळे आयुध ओबडधोबडच राहत असे. अश्यूलियन पद्धतीत टवके उडवून हलकेहलके इष्ट आकार घडवीत. त्यामुळे सलग व धारदार अशी कड व अणकुचीदार टोक तयार होई. केवळ दगडाचे आयुध वापरण्याऐवजी त्याला लाकडी किंवा हाडाच्या दांड्याची जोड द्यावी, हे ज्ञान त्यास होऊ लागले. दगडी हत्यार काठीला वा हाडाला बांधून दांड्यात भोक पाडून त्यात दगड, किंवा दगडात भोक पाडून त्यात दांडा, तो अडकवू लागला. दांड्याला खाचा पाडून त्यात तो दगड बसवू लागला. त्यामुळे कुऱ्हाडी, विळे, बाण असे संयुक्त आयुध बनू लागले. उत्तरपुराणाश्मयुगापासून पुढे संयुक्त आयुधे विशेष प्रचलित झालेली दिसतात. यासाठी दगडाच्या लहान आकाराच्या छिलक्या व पाती तयार करण्यास या वेळेपासूनच प्रारंभ झाला होता. आंतर व नव या दोन अश्मयुगांत या छोट्या पात्यांचा उपयोग करून हरतऱ्हेची संयुक्त आयुधे बनविण्यात मानवास प्रावीण्य प्राप्त झाले. बाण, सुऱ्या, विळे, खुरपी अशी अनेकविध उपकरणे आता तयार झाली. लहानलहान भाग एकत्र आणून आयुध तयार करण्याची ही पद्धती पूर्वीच्यापेक्षा अधिक वेळ खाणारी व विशेष कौशल्याची होती. परंतु यामुळे उत्पन्न झालेली आयुधे विविध प्रकारची तर होतीच, पण कार्यक्षमही होती. उपकरणे वा आयुधे यांच्या निर्मितितंत्राची उत्क्रांती विचारपूर्वक किंवा पूर्व-

योजनेप्रमाणे झाली नाही. गरजा, उपलब्ध सामग्री आणि परंपरागत ज्ञान यांच्या समन्वयातून ती होत गेली. उदा., पुराणाश्मयुगात मुख्यत: घातक आयुधे तयार झाली, तर नवाश्मयुगात शेतकी व्यवसायाला उपयोगी अशी विळा, खणण्याची काठी ही अवजारे तयार होत होती. क्षेपणायुधांत भाला, भालाफेकीची काठी, बोला, धनुष्यबाण व गोफण ही सर्व प्राणघातक आयुधे होती. मुख्यत: शिकारीसाठी वापरण्यात येणारे आयुध म्हणजे भाला. टोकदार काठी हेच भाल्याचे पहिले रूप होय. टोक भाजून, टणक करून, टोकाला दगडी फाळ लावून ते केलेले असे. हे भाले जास्त दूरवर फेकता यावेत म्हणून त्यांच्या एका टोकाला उंचवटा असणारी काठी उत्तरपुराणाश्मयुगात काही ठिकाणी वापरात आली. तीनचार कातडी वाद्यांच्या टोकांना गोल गोटे बसवून त्यांची दुसरी टोके एकत्र बांधलेले आयुध म्हणजे ‘बोला’. आपल्या डोक्यावर ते गरगर फिरवून जोराने भिरकावून दिले, की चक्रासारख्या फिरणाऱ्या या गोट्यांच्या तडाख्यात एखादा मोठा पक्षी सापडे किंवा त्यात श्वापदाचे पाय गुंतून ते हाती लागे. धनुष्यबाणाच्या उपयोगास आंतराश्मयुगापासून आरंभ झाला असावा. धनुष्याला कातडी वादी लावीत. बाणाला दगडाची किंवा हाडांची टोके बसवीत. गोफण हे एक प्रभावी क्षेपणायुध नवाश्मयुगात गवसले. त्यास दगड नसले तर मातीचे भाजून पक्के केलेले गोळे वापरीत असत. लाकडे व हाडे यांचा स्वतंत्र उपकरणांच्या निर्मितीसाठीही उपयोग केलेला आढळतो. लाकडाची हत्यारे कालौघात बव्हंशी नष्ट झाली तरी भाला, भालाफेकीची काठी, धनुष्यबाण व खणण्याची काठी ही महत्त्वाची अश्मयुगीन अवजारे लाकडीच होती, हे निश्चित. हाडे व शिंगे यांजपासून बनविलेल्या अनेक वस्तू आजही टिकून राहिल्या आहेत. त्यांत प्रामुख्याने बाणांची टोके, मासेमारीसाठी छोटे काटेकारी बाण, गळ, सुया, दाभणे यांचा समावेश होतो. ह्यांपैकी काही वस्तूंची निर्मिती जरी उत्तरपुराणा-श्मयुगात होऊ लागली असली, तरी त्यांतील वैविध्य व कौशल्य आंतराश्मयुगातच पाहावयास मिळते. या काळातच हस्तिदंताच्याही वस्तू बनविण्यात येऊ लागल्या.







अश्मयुग
भाग ९
पोस्तसांभार :: लक्ष्मण काटेकर @ 7588020886
अग्नी : तांत्रिक विद्यांच्या बरोबरीने अग्नीचेही मानवाला मोठे साहाय्य झाले आहे. अश्मयुगातील सर्वांत प्राचीन असे मानवसंबद्ध अग्नीचे अवशेष चीनमधील जोकोत्येन येथील गुहांत मिळाले आहेत. यदृच्छया निर्माण झालेला अग्नी तसाच तेवत ठेवण्याची कला जोकोत्येनच्या रहिवाशांना माहीत असावी. पुढे अश्म- युगाच्या विविध खंडांत सर्वत्र मानवाने अग्नीचा सतत उपयोग केलेला दिसतो, मात्र तो अग्नी त्याने उत्पन्न केला, की वणव्यासारख्या आगीची धग टिकवून धरली, हे सांगता येत नाही. लाकडे, हाडे किंवा क्वचित कोळसा (पॅलेस्टाइन) या कामाला सर्पण म्हणून वापरलेला असे. अग्नी निर्माण करण्याची विद्या उत्तरपुराणा- श्मयुगात साध्य झाली असण्याची शक्यता आहे. आंतराश्मयुगात व नवाश्मयुगात ती नक्कीच हस्तगत झाली होती. गारगोटी व लोखंडाचा अंश असलेला दगड यांच्या घर्षणातून अग्नी उत्पन्न करीत. अग्नीचा उपयोग कृत्रिम रीत्या उष्णता व उजेड निर्माण करणे, कच्चे मांस भाजून खाणे, जनावरांची चरबी दगडी दिव्यात घालून वाती जाळणे, जनावरांना घाबरवून स्वत:चे रक्षण करणे, काठ्यांची व हाडांची टोके भाजून ती टणक करणे इत्यादींसाठी होत असे. आंतराश्मयुग व नवाश्मयुग यांत अग्नीचा सुटसुटीतपणे वापर करता यावा म्हणून शेगड्या, चुली, भट्ट्या तयार करण्यात आल्या होत्या. स्वयंपाकाबरोबरच, मातीच्या मूर्ती अथवा भांडी भाजणे यांसाठीही नवाश्मयुगात अग्नीचा वापर झाला. अशा भट्ट्या काही नवाश्मयुगीन वसाहतींच्या अवशे



षांत मिळाल्या आहेत.
भाग १०
पोस्तसांभार :: लक्ष्मण काटेकर @ 7588020886
उपकरणे, भांडे इ.









: पुराणाश्मयुगातील व आंतराश्मयुगातील अत्यंत अस्थिर आणि भटके जीवन लक्षात घेता, मानवाला काही साठवणाची गरज भासली असेल, असे वाटत नाही. साठवून ठेवण्यासाठी वेळ अथवा निकड त्याला भासावी असे पदार्थही त्या वेळी त्याच्याजवळ नव्हते. उत्तरपुराणाश्मकालीन गुंफांतील चित्रकारांनी वापरलेले दगडी दिवे सोडले, तर अन्य कसलेही भांडे ज्ञात नाही. पुढे नवाश्मयुगाच्या पूर्वार्धात जेरिको, जार्मो येथील माणूसही फक्त दगडीच भांडी वापरीत होता. यांत कटोरे, पेले असे काही प्रकार आढळतात. दगडी भांड्यांच्या घडणीत व सजावटीत थोडा फरक स्थलकालपरत्वे आढळतो. उदा., सायप्रसमधील खिरोकिटिया येथील भांडी घासून घासून झिलईदार करण्यात येत. परंतु त्यांच्या आकारात फारसे वैविध्य नाही. दगडाप्रमाणेच लाकडी ठोकळे कोरून त्यापासून भांडी तयार करण्यात येत असतीलही, परंतु त्यांचे आज अवशेष नाहीत.
नवाश्युगाच्या पूर्वार्धापर्यंत मृत्पात्रे करण्याची विद्या मानवाला हस्तगत झालेली नव्हती. नवाश्मयुगाच्या मध्यापासून अशी भांडी बनविण्याला आरंभ झाला. निदान पश्चिम आशिया व भूमध्य समुद्राभोवतालचा प्रदेश यांपुरते तरी हे विधान निश्चित पुराव्यांवर आधारलेले आहे. मृत्पात्रे तयार करण्याची विद्या केवळ याच लोकांना साध्य झाली, असे समजण्याचे कारण नाही. तिचा उगम निरनिराळ्या ठिकाणी स्वतंत्रपणेही झाला असेल. तद्वतच ती याआधीही कोणा समाजाला साध्य झाली असेल. पण प्रत्यक्ष आधाराने सांगता येते, ते फक्त पश्चिम आशियाविषयी. या कलेचा उगम कसा झाला याविषयी जी अनेक मते प्रचलित आहेत, त्यांत जास्त ग्राह्य अनुमान असे, की आधीपासून वापरात असणाऱ्या बांबूच्या टोपल्यांना माती लिंपण्यास आरंभ झाला. एखादी अशी टोपली केवळ योगायोगाने जळाली असावी व लिंपलेल्या मातीचे झालेले तुकडे हाती लागले. अशा अपघातातून मातीच्या दोन गुणांचा शोध लागला. ते म्हणजे–मनाजोगता आकार देता येणे व

भाजूण काढले तर तो आकार पक्का होणे. याच माहितीचा उपयोग करून मृत्पात्रे करण्यास आरंभ झाला. भांडी करताना, त्यांना आधीपासून दगडी-लाकडी भांड्यांना देण्यात येणारे वाडगे, कुंडे यांसारखे आकार तर दिलेच पण ठेवरेवीला, विशेषत: पाणी व तत्सम द्रवपदार्थ यांच्या ने-आणीला, जास्त उपयुक्त अशी लहान तोंडाची भांडीही तयार करण्यात येऊ लागली. भोपळा, नारळ अशांसारख्या फळांवरून हे आकार सुचले असावेत. कदाचित या फळांच्या कवचांचा असा उपयोग यापूर्वीही केला जात असावा. लवकरच या भांड्यांना रंग लावून व त्यांवर नक्षी उमटवून ती सुशोभित करण्यासही सुरुवात झाली असावी. यापुढे निरनिराळे आकार, भांडी घडविण्याच्या पद्धती यांचे शोध लागत गेले. चाकाचा शोध लागला अधिक प्रमाणबद्ध व डौलदार भांडी तयार होऊ लागली. भांडी भाजण्यासाठी निरनिराळ्या प्रकारच्या भट्ट्याही वापरात आल्या. परंतु हा सर्व पसारा नवाश्मयुग व ⇨ताम्रपाषाणयुग यांच्या संधिकालातीलच आहे.

बांबू, लव्हाळे व वेत एकत्र गुंफून, मासे पकडण्यासाठी खूप मोठाल्या टोपल्या आंतराश्मयुगीन यूरोपात (डेन्मार्क – एर्टेबोल संस्कृती) वापरीत. याच्या पुढची पायरी म्हणजे चटया विणणे आणि शेवटी घरगुती उपयोगाच्या लहानमोठ्या टोपल्या, दुरड्या विणणे ही होय. पॅलेस्टाइनमधील जेरिको व जार्मो आणि ईजिप्तमधील फायूम यांसारख्या ठिकाणच्या नवाश्मयुगीन थरांत मातीवर उमटलेल्या ठशांच्या स्वरूपात टोपल्या व दुरड्या यांचे अवशेष पाहावयास सापडतात. यांग-शो या चिनी नवाश्मयुगीन समाजास बुरूडकाम अवगत होते. अमेरिकेतील बुरूडकामाचा पुरावा साधारण पॅलेस्टाइनइतकाच इ.स.पू. सातव्या सहस्रकातील असून दक्षिण अमेरिकेतील बुरूडकाम अत्युकृष्ट दर्जाचे समजले जाते.

भाग ११
पोस्तसांभार :: लक्ष्मण काटेकर @ 7588020886
धर्म : पुराणाश्मयुगातील व आंतराश्मयुगातील धार्मिक जीवनात मुख्य साधन म्हणजे गुहांतील चित्रे होत. ह्या गुहा मंदिरे वा प्रार्थनास्थळे म्हणून वापरण्यात येत असत. नवाश्मयुगात प्रथमच मंदिर किंवा प्रार्थनास्थान उभारलेले दिसते. मध्याश्मयुगातील व्हिस्टोनीसचे पुरोहिताचे घर सोडले, तर यापूर्वीच्या काळातील धार्मिक स्वरूपाची कोणतीच वास्तू मिळालेली नाही. जेरिका येथील मंदिरे आयताकार होती. क्वचित त्यांच्या समोर एक ओवरी आणि एक छोटासा मंडपही दिसतो. दारासमोरच्या भिंतीत कोनाडा करून त्यात दगडी खांब वा मूर्ती ठेवती. आर्पाकिया येथे एक प्रशस्त घुमटाकार मंदिर आहे. गाभारा गोल (व्यास ९ मी.) व त्यासमोर आयताकार मंडप (लांबी १८ मी.) आहे. दोन्ही ठिकाणी घराचीच रचना थोड्याफार फरकाने मंदिरासाठी वापरलेली आहे, हे स्पष्ट दिसते. तुर्कस्तानातील नवाश्मयुगीन अवशेषांत (कटाल हयुक) हीच गोष्ट अधिक स्पष्ट दिसते. तेथील मूर्तिकाम, भिंतीवरील चित्रे व शिल्पे यांमुळे या वास्तू धार्मिक उपयोगाच्या असाव्यात हे कळते. त्या वेळी धार्मिक वास्तूंना काहीं ठळक वैशिष्ट्ये प्राप्त झाली असावी, हे उब्राइड संस्कृतीच्या अवशेषांवरून स्पष्ट होते (एरिडू व टेपे गौरा). आयताकार दालनाच्या एका टोकाला मूर्तीचे पीठ अथवा स्थंडिल आहे. बाहेरून जोते बरेच उंच ठेवीत. अनेक भित्तिस्तंभ किंवा क्षेपप्रतिक्षेप आहेत. सुमेरियन काळातील ⇨झिगुरातसारख्या मंदिराच्या वास्तूंच्या रचनावैशिष्ट्यांचा उगम येथे पाहावयास सापडतो. ह्याशिवाय दगडी, मातीच्या वा हाडाच्या मूर्ती आणि थडगी यांवरूनही धार्मिक जीवनासंबंधी बरीच माहिती मिळते. त्याच्या धार्मिक कल्पना निश्चितपणे काय होत्या, ह्याविषयीचा कसलाच स्पष्ट पुरावा आज मिळत नाही. तसेच वैयक्तिक व सामाजिक स्मृतींतून निर्माण होणाऱ्या दंतकथा व परंपरा यांचीही माहिती आपल्याला नाही. मात्र पुरोहिताचे स्थान काय व तो काय कामे करीत असावा, याची थोडीफार कल्पना येते पण त्याच्या शक्तीचे गूढ समजत नाही.

जारणमारण यांसारख्या तंत्रांवर लोकांचा त्या वेळी विश्वास होता. एखाद्या जनावराच्या छोट्या प्रतिकृतीवर बाण लागल्याचे चित्र काढले, की तो प्राणी शिकारीत सहज हाती लागेल अशी कल्पना होती. फ्रान्स व स्पेन येथील अनेक गुहांत अशी कितीतरी चित्रे सापडतात. भालाफेकीच्या काठीवरील कोरीव चित्रेही याच उद्देशाने काढलेली असावीत. केवळ शिकारीवरच अवलंबून असणाऱ्या माणासाने आपल्या व्यवसायात अतिमानुषी शक्तींचे अशा तऱ्हेने साहाय्य मिळविण्याचा यत्न करावा हे स्वाभाविक वाटते. दुसरे तत्त्व म्हणजे जननतत्त्व होय. या तत्त्वाची आराधना करण्यात येत असल्याचा पुरावा अनेकविध स्वरूपांत सापडतो. वर उल्लेखिलेल्या मातृका-मूर्ती या त्यांतील प्रधान अवशेष होत. समागम करणाऱ्या पशूंच्या मूर्तीत हाच आशय आहे. एतद्विषयी काही क्रियाकर्मे (विधी) होत असावीत, असे फ्रान्समधील गुहेत असणाऱ्या पूर्णाकार नग्न स्त्रीमूर्तीवरून वाटते. तिसरी महत्त्वाची गोष्ट मरणोत्तर जीवनाविषयीची असून त्यात ‘आत्मा अमर आहे’ ही कल्पना पूर्वी पूर्वपुराणाश्मयुगातही मूळ धरून असावी. या कल्पनेच्या दोन पायऱ्या दिसतात. एक मृतात्म्याचा प्रवास व दुसरी पुनर्जन्म आणि तोही शक्यतो मानवी स्वरूपात दर्शविला आहे. यूरोपात सापडलेल्या निअँडरथल मानवाच्या थडग्यांतून अन्न, हत्यारे व क्वचित दागिनेही त्याच्या भोवती पुरलेले दिसतात. अन्न व हत्यारे ही त्याच्या मरणोत्तर जीविताची शिदोरीच होय. थोड्या नंतरच्या काळात पुरलेल्या प्रेतांचे पाय पोटाशी दुमडून घेतलेले आहेत. यांत आईच्या पोटात मूल याच अवस्थेत असते, हे प्रामुख्याने दाखवावयाचे असून पुनर्जन्माची प्रतीक्षा करणारा हा जीव भूमातेच्या पोटात त्याच अवस्थेत पुरण्यात येत असे. गुहेच्या जमिनीत किंवा क्वचित झोपड्यांच्या जमिनीखाली मृताला पुरण्यात येत असे. यावरून हा मृतात्मा घरादारांचे रक्षण करण्यासाठी तेथे ठेवीत, असा निष्कर्ष काही तज्ञ काढतात. गणचिन्हासंबंधीही अश्मयुगीन मानवाच्या काही विशिष्ट कल्पना होत्या. एखाद्या प्राण्याच्या अगंच्या काही विशेष शक्तींमुळे वा गुणांमुळे त्याला महत्त्व प्राप्त होऊन तो एकेका गटाचा वा कुलाचा पालक बनत असे आणि त्याची प्रतिकृती ही त्या गटाचा ध्वज किंवा निशाणी समजली जाई. ही निशाणी पतकरताना, त्या प्राण्याचे अतिमानुषी बल आपल्या पाठीशी सतत अभे राहावे, ही कल्पना त्यामागे असावी.

नवाश्मयुगात शिकारीचे महत्त्व ओसरले. साहजिकच त्यात यश मिळविण्यासाठी जादूटोण्याची गरजही आता सरली. तथापि पूर्वीच्या काही समजुती थोड्याफार फरकानिशी पुढे चालूच राहिल्या. त्यांपैकी मातृकामूर्ती नवाश्मयुगीन अवशेषांत फार मोठ्या प्रमाणावर सापडतात. जननक्रियेतील स्त्रीतत्त्वाचे पूजन या स्वरूपात होत राहिले, तसेच आता पुरुष तत्त्वाचेही पूजन सुरू झाले असावे. भूमध्य सागराभोवतीच्या प्रदेशातील कुऱ्हाडपूजा ही लिंगपूजेशी निकट समजली जाते. शिवाय पुरुषतत्त्वाची आराधना कबुतर व वृषभ या रूपांत करण्यात येई. मृतात्म्याची व्यवस्था अधिक बारकाईने करण्यात येऊ लागली. केवळ खड्डा करून त्यात प्रेत गाडण्याऐवजी आता रचनापूर्वक बांधलेली थडगी दिसू लागली. काही भागांत मोठी दगडी थडगी वा शवपेटिका वापरण्यात येऊ लागल्या होत्या. कदाचित डामडौलाचा व वैभवाचा निदर्शक असा हा भाग समजता येईल. बहुतेक थडग्यांतून मातृकामूर्ती ठेवण्यात आलेल्या आहेत. या मूर्ती म्हणजे पूर्वी अभिप्रेत असणाऱ्या पृथ्वीमातेची मूर्त रूपे होत. खास नवाश्मयुगात उत्पन्न झालेला धार्मिक घटक म्हणजे नैसर्गिक शक्तीची (पंचमहाभूतांची) उपासना करणारा घटक होय. यापुढे शेती करू लागणाऱ्या समाजांना वार्षिक ऋतुचक्राची कल्पना यावयास लागलेली दिसते. त्यातूनच शेतीस उपयोगी पडणाऱ्या सूर्य व पाऊस या दोन देवतांची उपासना मूळ धरू लागली असावी. यांची मूर्त स्वरूपात पूजा होण्याऐवजी त्यांच्या स्थित्यंतराचे व गमनागमनाचे प्रसंग सामुदायिक उत्सवरूपाने साजरे होऊ लागले. दुसरीकडे जननतत्त्वाचा आवाका वाढून पूर्वीप्रमाणे माणसे व पशू यांच्या प्रजोत्पादनाबरोबर किंवा त्याहीपेक्षा जास्त महत्त्वाची म्हणून जमिनीची सुपीकता त्यात समाविष्ट झाली. या समजुतींतून निर्माण झालेल्या वेगवेगळ्या देवदेवतांची पूजा-अर्चा व प्रार्थना यांसाठी वर सांगितलेली मंदिरे उभारण्यात आली असावीत.

या सर्व समजुती, उत्सव, कल्पना ह्यांतून उत्तरनवाश्मयुगीनांना त्यांच्या पुराणकथा, दंतकथा-धर्म मिळाला असावा.



अश्मयुग
भाग १२ 
पोस्तसांभार :: लक्ष्मण काटेकर @ 7588020886
अलंकरण, कला इ. : उपजीविका कष्टसाध्य आणि एकूण जीवन अस्थिर असले, तरी मानवाची उपजत सौंदर्यदृष्टी व अभिरुची निरनिराळ्या प्रकाराने व्यक्त झालेली दिसते. त्यांतला सगळ्यांत महत्त्वाचा प्रकार म्हणजे अलंकरण. आपले शरीर सुशोभित करण्याची तीव्र इच्छा मानवाला सतत आहे. यासाठी चित्रविचित्र रंगांचे विलेपन ही सगळ्यात आरंभीची पायरी होय. अश्मयुगातील काही सांगाडेही गेरूने रंगविलेले आहेत. त्यांवरून अश्मयुगीन माणूस अंगाला रंग लावीत असावा, असा कयास करता येतो. दुसरा प्रकार म्हणजे, प्राण्यांची हाडे, दात, नखे किंवा वाळक्या बिया यांना भोके पाडून त्यांच्या माळा करून गळ्यात घालणे हा होता. आंतराश्मयुगीन अवशेषांत असे ताइतासारखे वापरलेले दात व हाडे खूप सापडतात. तिसरा प्रकार म्हणजे रंगीत वा चमकदार दगड घेऊन त्यांचे मणी, लोलक आणि ताईत तयार करणे व त्यांच्या माळा अंगाभोवती गुंडाळणे हा होता. चंद्रकोरीच्या, कुऱ्हाडीच्या किंवा पक्ष्याच्या आकाराचे ताईत सापडतात. पण बहुतेक ताईत हे तोड्याच्याच स्वरूपाचे समजावयास हवेत. नवाश्मयुगात दगडी मणी आणि ताईत यांचे विविध प्रकार पाहावयास मिळतात. अलंकारांकडे इतके लक्ष होते, की वस्त्रप्रावरणाकडे विशेष लक्ष देण्याची अश्मयुगीन माणसाला जरूरच भासली नसावी, इतका पुरावा मिळतो. अश्मयुगातील वस्त्रांचे प्रत्येक्ष अवशेष उपलब्ध नाहीत. माणसाचे पहिले चित्र उत्तरपुराणाश्मयुगातीलच पाहावयास मिळते. या चित्रणातून तो सहसा वस्रहीनच दिसतो. क्वचित काही मूर्तींवर (पूर्व यूरोप) केसाळ असे कपडे दाखविले आहेत. त्यावरून अतिशीत प्रदेशात जनावरांची कातडी लपेटून घेण्यात येत, पण इतरत्र वस्त्रांची जरूर भासत नव्हती. ही वस्त्रे शिवण्यासाठी वा ती बांधून घेण्यासाठी उपयोगी असे भोके पाडण्याचे दगडी टोचे व हाडांची दाभणे अवशेषांत मिळतात. जनावरांच्या केसांचा (लोकरीचा) कपड्यासाठी विणून उपयोग करीत किंवा काय, ते सांगता येत नाही.

गवताचे व अंबाडीसारख्या वनस्पतीचे धागे एकत्र विणून दोर तयार करीत. या दोरांचा उपयोग धन्युष्यांसाठी किंवा मासेमारीची जाळी विवण्यासाठी होत असे. सूत कातण्यास आरंभ नवाश्मयुगातच झाला. अवशेषांत चातीची, मातीची वा दगडी चाके मिळाली आहेत. तसेच मातीवर उमटलेले कापडाचे ठसे पॅलेस्टाइन व ईजिप्त येथील काही अवशेषांत मिळाले आहेत. इतरत्र अद्यापही चामड्याचेच कपडे वापरात असावेत. या अवशेषांतील मृत्पात्रांवर घागरा व जाकीट किंवा उपवस्त्र अशी दोन वस्त्रे काढलेली आढळतात. त्यांना गुंड्याही लावल्या आहेत. विणकाम व शिवण यांविषयीची अधिक माहिती नाही.

या प्रदीर्घ काळातील चित्रकला व मूर्तिकला यांचे अनेक नमुने आज उपलब्ध आहेत. यूरोप, आफ्रिका व आशिया हा तिन्ही खंडांत ते सापडतात. यांपैकी यूरोपात व आफ्रिकेत पूर्वपुराणाश्मयुगापासून थेट नवाश्मयुगापर्यंतच्या कलाकृती आहेत, तर आशियात सामान्यपणे आंतराश्मयुगीन कलाच दिसते. खुद्द नवाश्मयुगातील कलाकृतींचे प्रकार व त्यांची परंपरा पूर्णत्वे भिन्न आहे. पूर्वपुराणाश्मयुगातील चित्रकलेचे सर्वोत्तम नमुने फ्रान्स व स्पेन देशांतील गुहांतून सापडले आहेत. ही चित्रे गुहांत खूपच खोलवर, अगदी आतल्या भागांत काढलेली आहेत. उत्तरपुराणाश्मयुग व आंतराश्मयुग यांतील चित्रे जवळपास उघड्यावर असणाऱ्या दरडी व प्रस्तर यांवरच काढली आहेत. चित्रांच्या बाह्याकृती टोकदार दगडाने कोरून, पृष्ठभागावर उमटविलेल्या आहेत. यानंतर या आकृतींवर कुंचले किंवा फवारे यांनी रंग भरलेले आहेत. कुंचले बांबूच्या पट्ट्या किंवा काठ्यांची टोके ठेचून तयार कलेले असावेत. बहुतेक रंग नैसर्गिक रीत्या मिळतात तसेच वापरलेले आहेत. त्यांत मिश्रणाने बदल करण्याचा यत्न केलेला दिसत नाही. रंग देताना वर्ण्यविषयांनी अनुरूप असे स्वाभाविक रंग दिलेले आहेत. कित्येक वेळा रंग देण्याआधी खोदकाम करून आकृतीला उठाव देण्याचा प्रयत्न केलेला आहे. क्वचित माती थापून त्यातून उठावाची चित्रे केली आहेत. भोवताली वावरणारे गवे, रानरेडे, हरिणे, घोडे अशांसारखे प्राणी, प्राण्यांच्या शिकारींचे प्रसंग, नाच करणारे स्त्रीपुरुष, धार्मिक विधी करणारा पुरोहित हे प्रमुख चित्रविषय होत. स्पेनमधील काही गुहांतून वर्तुळे, चौकटी व तजन्य भौमितिक आकृत्या रेखाटल्या आहेत. उत्तरपुराणाश्मयुग आणि आंतराश्मयुग यांमध्ये रंगीत चित्रांऐवजी दगडाचा पृष्ठभाग खरवडून किंवा टाकी लावण्यासारखा ठोकून बाह्यकृती उमटविण्यात येत असे. अशा चित्रांना बहुधा रंग दिलेला नाही. मूर्तिकलेचे नमुने उत्तरपुराणाश्मयुगीनच आहेत. त्यांत हाडे, शिंगे व दगड यांवरील कोरीव कामाचा समावेश करता येतो. भालाफेकी काठ्या, पुरोहिताच्या हातातील दंड, यांवर अत्यंत वास्तवपूर्ण उत्थित शिल्पे खोदली आहेत. जनावरांच्या डोक्याच्या आकाराचे हाडांचे काही ताईतही मिळाले आहेत. दगडी कामांत स्त्रीमूर्ती मुख्य असून त्या अर्धाकृतीच्या व पूर्णाकृतीच्या स्वरूपांत आहेत. स्थूल शरीराच्या या मूर्तीचे नितंब, स्तन व जघनप्रदेश विस्तृत दाखविले आहेत. स्त्रीच्या जननकार्याकडे लक्ष वेधविण्याचा कलाकाराचा प्रमुख हेतू असावा. म्हणून यांना सामान्यपणे ‘स्त्रीमूर्ती’ म्हणत असले, तरी ‘मातृकामूर्ती’ म्हणणे जास्त सयुक्तिक ठरेल. नवाश्मयुगातील अवशेषांत चित्रकलेचे नमुने नाहीत. या कालखंडाच्या उत्तरार्धात मृत्पात्रांवर काढण्यात आलेल्या नक्षीत वेलपत्त्या, पशुपक्षी, भौमितिक आकृत्या अशा विविध आकृत्या असल्या, तरी या कामाचा चित्रकलेत समावेश करणे योग्य ठरणार नाही. मातीच्या भाजून केलेल्या आणि हाडाच्या मूर्ती, यांतील प्राणिमूर्ती व स्त्रीमूर्ती विशेष चांगल्या प्रकारे केलेल्या आहेत. यांतील स्त्रीमूर्ती मातृका-परंपरेतीलच आहेत. पूर्वीप्रमाणे या मूर्तीचे डोकेही केवळ एका गोळ्याने दाखवितात आणि नाकडोळेही कोरलेले नसतात.

पूर्वपुराणाश्मयुगातील कलाकृती म्हणजे आपल्या भोवताली दिसणार्‍या वस्तूंची केवळ नक्कल व प्रतिकृती नव्हे त्यांत निरनिराळे प्रसंग व परिस्थिती कल्पिली आहे. माणसाच्या प्रतिभाविलासाचा हा सर्वप्राचीन आविष्कार होय. विशेषत: गुहेतील चित्रकाम या दृष्टीने अत्यंत लक्षणीय समजावे लागते. मानवी बुद्धी व मन यांची एक वेगळीच झेप त्यांतून प्रतीत होते. परंतु या सगळ्या कलाकृती सौंदर्यनिर्मितीच्या उद्देशाने तयार करण्यात आल्या नाहीत हे निश्चित. त्यांत काही धार्मिक समजुती व कल्पना अंतर्भूत असाव्यात. किंबहुना पुराणाश्मयुगकालीन धार्मिक कल्पना आणि समजुती यांच्या माहितीचे मुख्य साधन म्हणजेच तत्कालीन चित्रकला होय [→प्रागैतिहासिक कला].








भाग १३
पोस्तसांभार :: लक्ष्मण काटेकर @ 7588020886
अश्मयुग, भारतातील: भारतात आजतागायत झालेले उत्खनन व संशोधन अश्मयुगातील कोणत्याच अवस्थेतील मानवाच्या जीविताचे स्पष्ट चित्र डोळ्यासमोर उभे करू शकत नाही. त्यातल्या त्यात नवाश्मयुगीन जीवनाविषयी थोडीशी तरी माहिती हाती येते पण इतर युगांतील मानव, त्याची वस्ती, त्याच्या भोवतालची सृष्टी, यांच्याविषयी जी कल्पना येते, ती फारच अंधुक व अस्पष्ट आहे. याचे साधे कारण असे, की अश्मयुगीन मानवाच्या जीवनावर प्रकाश पाडणारे जे अवशेष मिळाले आहेत, ते तुरळक व फुटकळ स्वरूपाचे आहेत. त्यांवरून त्याची जीवनपद्धती लक्षात येऊ शकत नाही व एकूण जागतिक अश्मयुगीन मानवी संस्कृतीशी असणारे त्याचे नातेही उलगडू शकत नाही. जे काही निष्कर्ष काढण्यात आलेले आहेत, ते फक्त दगडी आयुधे व उपकरणे यांच्या वर्गीकरणांतूनच. निरनिराळ्या वर्गांची यूरोपीय व आफ्रिकी वर्गांशी तुलना करून सांस्कृतिक टप्पे व कालक्रम यांविषयी विवेचन करण्यात आलेले आहे. या अवस्थांचा भूस्तरीय घडामोडींशीही कसा संबंध लावता येईल, या प्रश्नाचाही नीट निर्णय लागलेला नाही. या मर्यादा ध्यानात ठेवूनच भारतातील अश्मयुगासंबंधीच्या माहितीची नोंद घेतली जावी.

भारतीय अश्मयुगाचे चार खंड पाडण्यात येतात–पूर्वाश्मयुग, मध्याश्मयुग (कार्बन कालनिर्णयानुसार हा काळ ४०,००० वर्षांपूर्वीचा आहे, हे आता सिद्ध झाले आहे), उत्तराश्मयुग, आणि नवाश्मयुग यांतील नवाश्मयुगीन जीवनाचे स्वरूप जगाच्या इतर भागातील नवाश्मयुगातल्यासारखेच आहे. त्यापूर्वीच्या तीन कालखंडांतील सांस्कृतिक स्थिती, तदर्थक यूरोपीय संज्ञांत जे अभिप्रेत आहे तशी दिसत नाही. त्या अर्थाने उत्तरपुराणाश्मयुगाचा तर भारतात आढळही होत नाही. परंतु सांस्कृतिक अवस्था स्पष्ट करण्याच्या दृष्टीने सामान्यपणे भारतातील पूर्वाश्मयुग = यूरोपातील पूर्वपुराणाश्मयुग भारतातील मध्याश्मयुग = यूरोपातील मध्यपुराणाश्मयुग आणि भारतातील उत्तराश्मयुग = यूरोपातील उत्तरपुराणाश्मयुग अशी समीकरणे मांडता येतील.







 पूर्वाश्मयुग
पूर्वाश्मयुगातील आयुधांचे दोन स्पष्ट गट पडतात. एक गट वायव्य भारत व काश्मीर या भागापुरता असून, दुसरा भारताचा इतर प्रदेश, मुख्यत: आंध्र-तमिळनाडू इ. भागांत पसरला आहे. पहिल्या गटातील हत्यारे गोटे व मोठाली छिलके यांची बनविलेली आहेत. गोलसर बाजू पंजात पकडून खालच्या, सरळ धारेच्या बाजूने वस्तूंचे तुकडे पाडणे, हे या हत्यारांचे मुख्य काम होते. त्यांना चॉपर म्हणतात. पहिल्या गटात असे चॉपर व तत्सम प्रकार आढळतात. दुसऱ्या गटात, मुख्यत्वे छिलके व कपच्या दोन्ही बाजूंनी घडवून तयार केलेली बदामी आकाराची हातकुऱ्हाड हे मुख्य आयुध आहे. हे दोन्ही गट भौगोलिक दृष्ट्या अलग असले, तरी कालदृष्ट्या निकट आहेत–प्राय: समकालीनच असावेत. द्वितीय हिमयुगाच्या शेवटापासून येथे दोन्ही प्रकारची हत्यारे घडविण्यात आली. तृतीय हिमयुगात या संस्कृतीचा विस्तार व तंत्रज्ञान यांचा परमोत्कर्ष झाला पण या युगातील मानवाच्या शरीराचे कोणतेही अवशेष मिळालेले नाहीत.

कोकणपट्टीसारखे एका बाजूचे प्रदेश सोडले, तर भारताच्या बहुतेक सर्व भागांत मध्याश्मयुगीन आयुधे मिळाली आहेत. ही आयुधे चर्ट, जास्पर अशांसारख्या टणक व एकसंध दगडांपासून बनविलेली असून पूर्वाश्मयुगीन आयुधांपेक्षा खूपच लहान आहेत. यांत हरतऱ्हेच्या तासण्या, भोके पाडण्यास उपयुक्त अशी चोच असणारी हत्यारे बऱ्याच संख्येने सापडतात. कातडी कापण्यास व शिवण्यास त्यांचा उपयोग होत असावा. त्यांबरोबर छोट्या हातकुऱ्हाडीही आढळतात. वरील दगडांची छिलके व क्वचित पातीही दिसतात. मध्य-अभिनूतन काळाच्या शेवटच्या सहस्त्रकांपासून तो नूतनतम काळाच्या आरंभापर्यंत या युगाचे अस्तित्व होते. या काळी हवामान फारसे आर्द्र नसून घनदाट अशी जंगलेही फारशी पसरली नव्हती. या वेळच्या मानवाच्या शरीराचे अवशेष उपलब्ध नाहीत. आतापर्यंत रानटी बैल व भीमगज यांची हाडे सापडली आहेत.

भाग १४
पोस्तसांभार :: लक्ष्मण काटेकर @ 7588020886
मध्याश्मयुगाचा काळ ४०,००० वर्षांपूर्वीचा आहे, हे आता कार्बन कालनिर्णयानुसार सिद्ध झाले आहे. उत्तराश्मयुगाचा आरंभ नूतनतम काळाच्या आरंभी (इ.स.पू. १०,०००) झाला. काही भागांत तो इ.स.पू. ७,००० इतका नजीकचाही असू शकेल. मध्य व उत्तर भारताच्या काही भागांत असणारे घनदाट जंगलांचे प्रदेश सोडल्यास, इतरत्र मानवाची वस्ती उघड्यावर नदीकाठाने होती. पण या दोन जंगलांच्या प्रदेशांत मात्र मानवी वस्ती प्रस्तरालये व गुहा यांतच होती. या प्रस्तरालयांतील चित्रकामही उत्तराश्मयुगीनच असण्याचा संभव आहे. या युगातील आयुधे, लघुअश्मास्त्रे याच सदरात जमा होतात व यांत मुख्यत्वे गारेच्या दगडाची किंचित लांबटशी पाती आहेत. त्यांपासून चाकूची पाती, चंद्रकोरी, टोचे ही आयुधे तयार करण्यात येत. ती आयुधे हाडे व काठ्या यांजबरोबर वापरण्यात येणारी, म्हणजे संयुक्त आयुधे होत. ⇨ लांघणज या गुजरातमधील ठिकाणाखेरीज अन्यत्र उत्तराश्मयुगीन स्थायिक वसाहतींचे अवशेष उपलब्ध नाहीत. शिकार, मच्छीमारी व प्राथमिक स्वरूपाची शेती हीच या काळातील उपजीविकेची मुख्य साधने होत. मृत्पात्रांचा वापरही सुरू झाला असावा. लांघणज याच ठिकाणी काही मानवी सांगाडे सापडले असून ते मिश्र वंशाचे आहेत. हातपाय पोटाशी ठेवून हे सांगाडे थडग्यांत पुरण्यात आले होते. या भागात पाणघोडे, अस्वले, हरणे, सांबरे, रानगाई असे प्राणी वावरत असत.

भारतातील नवाश्मयुग आणि ताम्रपाषाणयुग ही दोन्ही साधारण समकालीनच आहेत. नवाश्मयुगीन म्हणून ओळखल्या जाणाऱ्या अवशेषांतही तांब्याच्या वस्तू सापडतात. ताम्रपाषाणयुगीन समाजही नवाश्मयुगीनांप्रमाणेच शेतकी, पशुपालन यांवरच जगत असे. म्हणून या दोन स्वतंत्र अवस्था समजाव्यात किंवा कसे, यावर तज्ञांत एकमत नाही. तथापि घासून गुळगुळीत केलेल्या दगडी कुऱ्हाडी वा छिन्न्या यांसारखे आयुधप्रकार आणि इतर ठिकाणच्या नवाश्मयुगीनांशी असणारी साम्ये ध्यानात घेऊनच काही समाजांना नवाश्मयुगीन तर काहींना ताम्रपाषाणयुगीन संबोधण्यात येते. भारतातील ताम्रपाषाणयुगाचे तीन पृथक भाग पडतात. एक उत्तर व वायव्य भारतातील, दुसरा पूर्व भारतातील व तिसरा दक्षिण भारतातील. या सर्व संस्कृतीचा काळ इ.स.पू. दुसरे सहस्रक व त्याच्या थोडा पुढे मागे असा आहे. याला अपवाद फक्त बलुचिस्तानच्या सरहद्दीनजीकच्या ⇨कुल्ली, झॉब या संस्कृतींचा असून त्या संस्कृती इ.स.पू. चौथ्या सहस्रकातील आहेत. परंतु भारतातील इतर समाजांशी त्यांचा सलग संबंध अद्याप प्रस्थापित झालेला नसल्याने व पश्चिम आशियातील नवाश्मयुगीन संस्कृतींशी त्यांचा जास्त निकटचा संबंध स्पष्टपणे दिसत असल्याने, त्यांना त्या क्षेत्रातील संस्कृतीच्या शाखा समजणे अधिक उचित ठरेल.

उत्तर भारताच्या वैशिष्ट्यपूर्ण अशा नवाश्मयुगीन संस्कृतीचा आढळ प्रामुख्याने काश्मीरमध्ये झेलमच्या खोऱ्यात झाला आहे. बूर्झाहोम येथील उत्खननांत गवसलेल्या अवशेषांवरून या समाजाच्या जीवनविकासाचे दोन टप्पे दिसतात. पहिल्यात, जमिनीत मोठाले खड्डे करून त्यांत वस्ती करण्यात येई. हे खड्डे सामान्यपणे तीन मी. व्यासाचे असून त्यांची खोली दीड ते चार मी. होती. यावर फांद्या व गवत यांचे छप्पर असावे. घासून धार लावलेली दगडी हत्यारे, हाडांचे टोचे, दाभण, राप्या व हातघडणीची मृत्पात्रे ही येथील सांस्कृतिक वैशिष्ट्ये होत. दुसऱ्या टप्प्यात, कच्च्या विटांची घरे बांधण्यात येऊ लागली. मृत्पात्रे घडविण्यासाठी चाकाचा वापर सुरू झाला. क्वचित तांब्याची हत्यारे सापडतात पण धातूच्या उपयोगाचे ज्ञान अगदी प्राथमिक स्वरूपाचे असावे. बी पेरण्याकरिता जमिनीत खळगे करण्यासाठी अणकुचीदार काठ्या वापरीत व त्या जोराने जमिनीत घुसाव्यात म्हणून त्यांभोवती दगडी कडी बसवीत. अशी वजने व दगडाचे विळ्यासारखे हत्यार सापडले आहे. यांवरून शेती करण्यात येई असा निष्कर्ष निघत असला, तरी हाडाच्या हत्यारांचे जे विविध प्रकार दिसतात त्यांवरून शिकारीलाच प्राधान्य असावे, असे दिसते. या काळातील काही थडग्यांत माणसांबरोबर कुत्रीही गाडलेली दिसतात. थडग्यातील सांगाड्यांवरून तेथील माणसांच्या वंशांची कल्पना येत नाही. जमिनीत खड्डे करून राहण्याची पद्धत व दगडी विळे यांवरून उत्तर भारतातील ही संस्कृती तत्कालीन चिनी नवाश्मयुगीन संस्कृतीशी संबद्ध असावी, असे मानता येते.

दुसरे क्षेत्र म्हणजे, ओरिसा, बिहार, आसाम या क्षेत्रांतील नवाश्मयुगीन संस्कृतीचे पूर्वक्षेत्र. गोल बुडाच्या दगडी कुऱ्हाडी, छिन्न्या व मुख्यत: चौकोनी खांद्यांच्या दगडी कुऱ्हाडी ही येथे सापडणारी वैशिष्ट्यपूर्ण आयुधे होत. या क्षेत्रातील निरनिराळ्या ठिकाणची मृत्पात्रे भिन्न प्रकारांची आहेत. येथे झालेले संशोधन पूर्ण कल्पना देण्यास पुरेसे नसले, तरी त्यातील विशिष्ट आयुधांवरून या संस्कृतीचा अन्यत्र जोडता येतो.

तिसरे क्षेत्र दक्षिण भारतातील नवाश्मयुगीन संस्कृतीचे. हे क्षेत्र उत्तर कर्नाटक व वायव्य आंध्र प्रदेश यांचे मिळून होणारे असून येथे मोठ्या प्रमाणावर उत्खनने करण्यात आली आहेत. त्यांपैकी ⇨ ब्रह्मगिरी, पिकलीहाल, टेक्कलकोटा ही महत्त्वाची होत. तेथे गोल वा चौकोनी आकाराच्या कुडाच्या घरांतून मानवी वस्ती होती. क्वचित वस्तीसाठी उंच अशा टेकड्यांवरील सपाट भागांचा उपयोग केलेला दिसतो. पहिल्या कालखंडात हातघडणीची राखी मृत्पात्रे वापरीत. दुसऱ्या कालखंडातील मृत्पात्रे तांबूस काळसर रंगाची आहेत. कोठेकोठे रंगीत नक्षीकाम केलेली मृत्पात्रेही या कालखंडात वापरलेली दिसतात. घासून गुळगुळीत केलेल्या कुर्‍हाडी, छिन्न्या यांसारख्या हत्यारांबरोबर दगडी पात्यांचा उपयोग मोठ्या प्रमाणावर करण्यात येत असे. दफनाची पद्धती अस्तित्वात असून मृताशेजारी त्याची आयुधे व भांडीही ठेवलेली आढळतात. या नवाश्मयुगीन संस्कृतीचा संबंध इतर भागांतील तत्सम संस्कृतींशी जोडण्याइतका प्रत्यक्ष पुरावा हाती नसला, तरी काही वैशिष्ट्यपूर्ण वस्तूंवरून, वर उल्लेखिलेल्या वायव्य भारतातील संस्कृतीप्रमाणेच ह्याचाही संबंध पश्चिम आशियातील नवाश्मयुगीनांशी असावा असे दिसते. तथापि निश्चित संबंध जोडता आलेले नाहीत, हे मान्यच करावयास हवे. वरील तिन्ही क्षेत्रांत पशुपालन व शेतकी हीच उपजीवविकेची प्रमुख साधने होती.



















संदर्भ : 1. Childe, Gordon, New Light on the Most Ancient East, London, 1958. 2. Clark, Grahame, World Prehistory–An Outline, Cambridge, 1961. 3. Clark,Grahame Piggott, Stuart, Prehistoric Societies, London, 1965. 4. Day, Michael M. Guide to Fossil Man, London, 1965. 5. Jacquetta, Hawkes Wooly, Leonard, Prehistory and the Beginnings of Civilization History of Mankind, Vol.1, London, 1963. 6. Leakey, L. S. B. Adam’s Ancestors, London, 1960. 7. Mate, M. S. Misra, V. N.Indian Prehistory, Poona, 1964, 1965. 8.Piggott, Stuart, Ed. The Dawn of Civilization, London, 1961. 9. Sankalia, H. D. Prehistory and Protohistory of India and Pakistan, Bambay, 1963. 10. Sankalia, H. D. Stone Age Tools, Poona, 1964. 11. Semenov, S. A. Trans. Thompson, M. W. Prehistoric Technology, London, 1964. 12. Singer, C.History of Technology, Vol. I, Oxford, 1954. 13. Stern Philip Van Doren, Prehistoric Europe, London, 1970.

देव, शां. भा. ढवळीकर, म. के.

 
दगड कधीच खोटे बोलत नाही
 https://kalaapushpa.com/2020/08/08/stones_tell_truth/
कोणे एके काळी, रामनामाने शिळांना समुद्रात तारले होते. आज काही शिळांनी रामाच्या लढ्याला तारले. त्या शिळांची, दगडांची, शिलालेखांची, दगडी पन्हाळ्याची, कातळाच्या  स्तंभांची, पाषाणाच्या मूर्तींची कथा…      

पण ही कथा सुरु होते ग्रीस मध्ये. १८७० च्या दशकात.

ग्रीक कवी होमरचे अजरामर महाकाव्य आहे इलियाड. या कथेच्या सुरुवातीला ट्रोयचा राजपुत्र पॅरीस हा मेनेलीयसची पत्नी हेलेनचे अपहरण करतो. त्यावर ग्रीक राजा मेनेलीयस ट्रोयवर हल्ला करतो. हे युद्ध १० वर्ष चालते. शेवटी एका बनावट घोड्यात सैन्य लपवून पाठवले जाते व ट्रोयचा पडाव होतो. होमरची कथा ‘काल्पनिक’ आहे असे इतिहासकारांचे मत होते. मात्र ग्रीक लोकांत अशी मान्यता होती की, होमरने एक प्राचीन ऐतिहासिक घटना, जी मौखिक परंपरांनी जपली होती ती लिहून काढली. १८७० मध्ये हेन्री श्लीमन (Henry  Schliemann) यांनी होमरने वर्णन केलेली ट्रोय कुठे असेल याचा शोध घेतला. तुर्कीस्तानच्या पश्चिमेला त्या नगरीचे अवशेष त्यांना सापडले. एका खाली एक असे इस पूर्व ३००० पर्यंत जाणारे ९ थर मिळाले. या उत्खननाच्या नंतर होमरने वर्णन केलेले युद्ध कदाचित इस पूर्व १३०० च्या आसपासचे घडले असावे असे आता मानले जाते.

ट्रोयच्या यशा पाठोपाठ बायबल मध्ये वर्णन केलेल्या गावांचे उत्खनन करण्यास सुरुवात झाली. या उत्खननातून इजिप्त, जोर्डन, इस्राईल, इराक, तुर्कस्तान आदि भागात उत्खनन केले गेले. या मधून अनेक प्राचीन गावे, राजे, साम्राज्ये समोर आली. या मधून बायबल मधील काही कथांना दुजोरा मिळाला, तर काही खोडल्या गेल्या.

अशा प्रकारे २० व्या शतकाच्या आधी, प्राचीन साहित्यावर आधारित असे उत्खनन युरोपीयन लोकांनी केले होते. त्या मधून साहित्याला पूरक असे काही पुरावे मिळाले होते. इसपुर्व ७ व्या / ८ व्या शतकातील होमरने, मौखिक परंपरेने जपलेली कथा लिहिली. पण जेंव्हा उत्खनन करून त्या कथेत वर्णन केलेले नगर मिळाले, तेंव्हा त्या साहित्याला आणि त्या आधीच्या मौखिक परंपरेला आधार मिळाला. या उत्खाननांमुळे युरोपियन लोकांचा प्रवास “प्राचीन साहित्य एक मिथक असते”  इथपासून “प्राचीन साहित्यात थोडेफार तथ्य असू शकते” इथ पर्यंत झाला.

इंग्रजांचा हा प्रवास होईतो २० व्या शतकाच्या मध्यावर भारत स्वतंत्र झाला. मात्र या वेळेपर्यंत इंग्रजांनी रामायण, महाभारत व पुराणे ही केवळ ‘मिथक’ आहेत, ‘कथा’ आहेत, ‘कल्पनाविलास’ आहे असा शिक्कामोर्तब केला होता. स्वतंत्र्य मिळालेल्या नवयुवा भारताला अनेक प्रश्न भेडसावत होते. त्यात एक प्रश्न होता स्वत:च्या मुळांचा. स्वत:च्या इतिहासाचा. स्वत:च्या identity चा. रामायण – महाभारत घडले होते का? अयोध्या खरेच रामाची जन्मभूमी होती का? वाल्मिकी रामायण आणि व्यासकृत महाभारत महाकाव्ये आहेत की इतिहास? राम – कृष्ण खरे होते की निव्वळ कविकल्पना?  

या प्रश्नांची उत्तरे साहित्यात मिळतात. स्वत: व्यास महाभारतात सांगतात की, “मी इतिहास लिहित आहे”. तसेच  महाभारतात मागे होऊन गेलेला मोठा राजा म्हणून रामाची गोष्ट येते. म्हणजे रामाची कथा सुद्धा इतिहास म्हणून येते. किंवा ११ व्या शतकातील स्कंद पुराणातील अयोध्या महात्म्य या अध्यायात अयोध्या, शरयू, रामजन्मभूमी या बद्दल सविस्तर माहिती आली आहे. हे ग्रंथ इतिहास आणि भूगोल सांगत आहेत हे ते स्वत: सांगतात.

भारतीय ग्रंथांशिवाय, अयोध्येत आलेल्या परदेशी प्रवाश्यांनी लिहून ठेवलेली काही प्रवासवर्णने आहेत. रामजन्मभूमीच्या बाबतीत उपलब्ध असलेली प्रवासवर्णनात – १६३१ मध्ये Joannes De Laet हा डच प्रवासी काही काळ अयोध्येत राहिला होता. त्याने शरयू नदीत स्नान करून रामाचे दर्शन घ्यायला येणाऱ्या भाविकांबद्दल तपशीलवार लिहिले आहे. १६३४ मध्ये आलेल्या Thomas Herbert ने रामनवमीला रामजन्मभूमी मंदिरात होणाऱ्या गर्दी बद्दल लिहिले आहे. १६६७ मध्ये आलेल्या Joseph Tieffenthaler याने राम मंदिरात जाणाऱ्या शेकडो लोकांबद्दल लिहिले आहे. 

… परंतु, साहित्याला जो पर्यंत पुरातत्त्व शास्त्राची जोड मिळत नाही, तोपर्यंत सगळा खेळ हा “बोलाची कढी आणि बोलाचा भात” असा मनाला जातो. १९५५ मध्ये ASI ने रामायण व महाभारताशी संबंधित काही प्रकल्प हाती घेतले. श्री. बी. बी. लाल यांनी महाभारतात वर्णन केलेल्या नगरींचे उत्खनन केले. हस्तिनापुर, इंद्रपत, सोनपत, पानिपत, तिलपत, बघपत, आदी अनेक ठिकाणी उत्खनन केले गेले. या उत्खानातून इस पूर्व १३०० मधील मानवी संस्कृतीच्या खुणा मिळाल्या. राखाडी रंगाच्या खापरांवर काळ्या रंगाने रंगवलेली भांडी, (PGW Painted Grey Ware) तसेच लोहापासून तयार केलेल्या अनेक वस्तू मिळाल्या. जसे बाणांचे अग्र, भाल्यांचे अग्र आदि. हाडांपासून तयार केलेले द्यूतात वापरले जाणारे फासे सुद्धा मिळाले. १९६० मध्ये ASI च्या डॉ. एस. आर. राव यांनी समुद्रात बुडलेली द्वारका नगरी शोधली. या ठिकाणी केलेल्या उत्खननातून त्या नगरीचे प्राचीन अवशेष मिळाले. महाभारतात वर्णन केल्याप्रमाणे, द्वारका नगरी समुद्रात बुडाली होती हे या शोधातून पुढे आले. व महाभारत ही कविकल्पना नसून त्यामध्ये थोडेफार तरी तथ्य आहे हे मान्य केले गेले.

१९७५ मध्ये श्री. बी. बी. लाल यांनी रामायणाशी संलग्न असलेल्या गावांचे उत्खनन करण्याचा प्रकल्प हाती घेतला. या वेळी – अयोध्या, नंदीग्राम, शृंगवेरपूर, भारद्वाज आश्रम व चित्रकुट या ठिकाणी उत्खनन करण्यात आले. अयोध्येत रामजन्मभूमी परिसरात उत्खनन केले गेले. राम वनवासात असतांना भरत नंदीग्राम येथे राहिला होता. तिथे उत्खनन केले. शृंगवेरपूर येथे रामाने वनवासात जातांना गंगा नदी ओलांडली होती. इथे निषादराज गुहाने त्यांना आपल्या होडीतून गंगापार नेले होते. इथून पुढे राम, लक्ष्मण व सीता भारद्वाज आश्रमात गेले होते. भारद्वाज मुनींनी त्यांना चित्रकुटची माहिती दिली व तिथे जाण्याचा रस्ता सांगितला होता. आणि नंतर राम, लक्ष्मण व सीता मंदाकिनी नदीच्या तीरावर असलेल्या चित्रकुट येथे गेले होते.


रामायणाशी निगडीत स्थाने, जिथे श्री बी. बी. लाल यांनी उत्खनन केले
या सर्व ठिकाणी इस पूर्व २ ऱ्या सहस्रकातील मानवी संस्कृतीचे अवशेष मिळाले. विशेष उल्लेखनीय आहे शृंगवेरपूर येथे पाणी साठवण्यासाठी बांधलेला मोठा हौद. गंगा नदीच्या काठावर शृंगवेरपूर वसलेले आहे. गंगेच्या  पुराचे पाणी वाहून नेण्यासाठी येथे ११ मीटर रुंद व ५ मीटर खोल इतका मोठा कॅनाल मिळाला. या मधून वेगवेगळ्या बांधीव टाक्यांमध्ये गाळ साचू देत स्वच्छ पाणी एका मोठ्या हौदाकडे वळवले आहे. २० लाख लिटर पाणी साठवण्याची क्षमता असलेला हा हौद आहे.


श्रुंगवेरपूर येथील पाणीसाठ्याचा हौद
बी बी लाल यांनी अयोध्ये मध्ये  १४ ठिकाणी उत्खनन केले. जन्मभूमी जवळच असलेल्या हनुमान गढी येथे देखील उत्खनन केले गेले. बाबरी ढॉंचाच्या आतमधून देखील पाहणी केली गेली. या उत्खननाची माहिती पुढील प्रमाणे –

मशिदीला लागून दक्षिणेला व पश्चिमेला उत्खनन केले गेले.
या मध्ये अनेक थर मिळाले – सर्वात वरचा मध्य युगातला साधारण इस १५०० च्या आसपासचा. त्या खाली गुप्त कालीन थर. त्याच्या खाली कुशाण काळातील थर. त्याच्याही खाली शुंग काळातील थर. त्या खाली मौर्य काळातील थर. व त्या खाली NBPW (Northern Black Polished Ware) संस्कृतीचा थर.
इस १५०० चा थर हा मंदिर तोडलेल्या काळातला आहे.
इथे १४ स्तंभांच्या पायाचे अवशेष मिळाले आहेत. हे सर्व विटांनी बांधलेले होते.
यावर मंदिराचे पाषाणाचे स्तंभ उभे केले गेले असावेत.

मंदिराच्या स्तंभांचे अवशेष
कसौटी पाषाणाचे १२ स्तंभ बाबरी ढॉंचात वापरले होते. व २ स्तंभ जवळच असलेल्या एका मकबऱ्यात वापरले आहेत. या स्तंभांवर पूर्ण कलशाचे शिल्प कोरले आहे.
पूर्णकलश (पाण्याचा कलश व त्यामधून बाहेर येणारी पाने) हे अष्टमंगलचिन्हांपैकी एक आहे. कोणत्याही पूजेसाठी कलशाची स्थापना केली जाते. पूर्वी कुणाचे स्वागत करतांना कलश दिला जात असे. राम जेंव्हा वनवासातून परत आला तेंव्हा त्याचे स्वागत कलश देऊन केले होते असा उल्लेख  रामायणात आहे. असे पूर्णकलशाचे शिल्प असलेले स्तंभ ढॉंच्यात होते. 

स्तंभावरील कलश
दोन स्तंभांवर हातात त्रिशूल घेतलेल्या द्वारपालांचे शिल्प आहे. या स्तंभांमधील अंतर व उत्खननात मिळालेल्या स्तंभाच्या पायांमधील अंतर एकच आहे. पाषाणाच्या स्तंभाचा पाया उत्खननात मिळालेल्या स्तंभाच्या पायाच्या आकारापेक्षा थोडा लहान आहे. या वरून मंदिराचे स्तंभ या पायांवरच उभे होते हे कळते.
या स्तंभांवरील नक्षीकाम ११ व्या शतकातील कलेशी मिळते जुळते आहे हे दिसते.
हे सर्व स्तंभ उत्तर-दक्षिण व पूर्व-पश्चिम दिशेने काटेकोरपणे बांधले आहेत.
या मंदिराचे मुख पूर्व दिशेला होते.
ढॉंचाच्या मागे साधारण ४० फुट खोल असा चॅनेल आहे. हा शरयू नदीचा प्राचीन चॅनेल असावा.  
१९७५ मध्ये सुरु केलेल्या पहिल्या उत्खननातून अगदी स्पष्टपणे प्राचीन राम मंदिराचे पुरावे समोर आले होते. या पुराव्यांवरून १९८० च्या दशकात रामजन्मभूमीचा प्रश्न सुटला असता. पण काही इतिहासकारांनी समोर असलेले धडधडीत पुरावे मान्य केले नाहीत. त्यातून हा प्रश्न चिघळला आणि त्याचा शेवट १९९२ मध्ये ढॉंचा पाडण्यात झाला.

त्या नंतर २००३ मध्ये इलाहाबाद उच्च न्यायालयाने ASI ला जन्मभूमी स्थानावर उत्खनन करायचे आदेश दिले. हे आदेश होते – उत्खननाच्या प्रत्येक दिवशी Babari Mashid Action Committee चा एक सदस्य आणि रामजन्मभूमी गटाचा एक सदस्य तिथे उपस्थित असायला हवा. रोज उत्खननात ज्या ज्या वस्तू मिळतील त्याची एन्ट्री एका रेजिस्टर मध्ये केली जावी. व त्यावर दोन्ही गटाच्या सदस्यांनी सही करावी. असे आदेश दिले होते.

अशा प्रकारे दुसरे उत्खनन मशिदीच्या खाली सुरु झाले. या वेळी ASI चे श्री. बी. आर. मणी यांनी उत्खनन केले. या वेळी मिळालेल्या वस्तू अशा –

इस पूर्व दुसऱ्या सहस्रकापासून या ठिकाणी मानवी संस्कृतीचे अवशेष मिळाले.
हे अवशेष घरांचे / रस्त्यांचे नसून प्रत्येक थरातील अवशेष हे एका पूजनीय स्थानाचे होते.
गुप्तोत्तर काळात याच ठिकाणी एक गोलाकार मंदिर होते.
अभिषेकाचे पाणी वाहून नेण्याकरता बांधलेली मकरप्रणाली येथे मिळाली. अशी वस्तू केवळ मंदिरातच असल्याने प्राचीन मंदिराचे अस्तित्व अधोरेखित झाले.
१० व्या शतकात येथे एक मंदिर होते. मात्र ते मंदिर फार काळ टिकले नव्हते. कदाचित ते मंदिर तुर्कांनी पाडले असावे. (११ व्या शतकाच्या सुरुवातीला महंमद गझनीने सोमनाथ पाडले होते. तसेच मथुरेवर स्वारी करून तेथील मंदिरांवर हल्ला केला होता.)
१२ व्या शतकात याच ठिकाणी पुन्हा एक भव्य मंदिर बांधले होते. (सोमनाथचे मंदिर सुद्धा वेळोवेळी पुनश्च बांधले गेले होते.)
१२ व्या शतकातील मंदिराच्या ५० स्तंभांचा पाया मिळाला आहे.
मंदिरांच्या शिखरावर असलेले ‘अमलक’ मिळाले आहेत. (नागर मंदिरांच्या शिखरावर अवळ्यासारखा दिसणारा चपटा गोल decorative दगड.)
अनेक मातीच्या मूर्ती मिळाल्या आहेत. त्यामध्ये मानवी आकृती आहेत. प्राण्यांच्या आकृती आहेत. या मातीच्या मूर्ती – शुंग व गुप्त काळातील आहेत. मातीच्या मूर्तीची पूजा करणे व नंतर त्या मूर्तीचे विसर्जन करणे आजही हिंदू धर्मात पाहतोच.
बाबरी मशिदीला पाया वेगळा खणला नव्हता. जुन्या मंदिराच्या भिंतींवर नवीन भिंती बांधल्या होत्या.
सर्वात महत्वाचा असा एक शिलालेख मिळाला. ५ फुट रुंद व २ फुट उंच असा मोठा शिलालेख बाबरी मशीद पाडली त्या ढिगाऱ्यात मिळाला. बाबरी मशिदीच्या एका भिंतीत ती शीला वापरली गेली होती, जी भिंत पडल्यावर बाहेर आली. हा लेख ‘विष्णू-हरि लेख’ या नावाने ओळखला जातो. सुरुवातीला मार्क्सिस्ट इतिहासकारांनी “ही शीला नव्याने कोरून इथे ठेवली आहे” असा निराधार आरोप केला. नंतर पवित्रा बदलून “ती शीला लखनौ संग्रहालयातून चोरून आणून इथे ठेवली आहे” असा ही आरोप केला. मात्र लखनौ संग्रहालयाने त्यांच्या कडे असलेला त्रेता-के-ठाकूर येथील शिलालेख त्यांच्याकडेच असल्याचा निर्वाळा दिला. एकूण हा शिलेख अग्निदिव्यातून पार पडून शुद्ध असल्याचे सिद्ध झाले. हा लेख २० ओळींचा असून त्यावर लिहिले आहे –
“नम: शिवाय” या मंत्राने शंकराला नमन करून लेखाची सुरुवात होते.
गढवाल राजा गोविंदचंद्र याचा अंकित असलेल्या अनयचंद्र राजाने हे मंदिर बांधले आहे.
विष्णू-हरिचे हे मंदिर आहे. ज्याने अप्रतिम-विक्रम केला त्या (रामा) चे हे मंदिर आहे. ज्याने दहा शीर असलेल्या राक्षसाला मारले त्याचे हे मंदिर आहे.
या मंदिराला सोन्याचा कळस बांधला आहे.
विष्णूच्या अवतारांची स्तुती व अनयचंद्राच्या आधीच्या राजांची प्रशस्ती व नंतरचा राजा आयुषचंद्र याची प्रशस्ती येते. 

विष्णूहरि शिलालेख
या  सर्वातून निष्कर्ष असे निघतात की – बाबरी मशीद ही जुन्या मंदिरावर बांधली होती. आधीचे मंदिर, १२ व्या शतकात बांधले होते. ते मंदिर पूर्वाभिमुख होते. राम हा सूर्यवंशी देव असल्याने, त्याचे मंदिर सूर्य मंदिराप्रमाणे पूर्वमुखी असणे योग्यच आहे. कदाचित वर्षातील काही ठराविक दिवशी, उगवत्या सूर्याची किरणे गर्भगृहातील मूर्तीवर पडत असावित. हे मंदिर भव्य होते. त्याला उंच शिखर असून त्याला सोन्याचा कळस होता. मंदिराच्या बाजूने परिक्रमा मार्ग होता. शरयू नदीच्या काठावर हे मंदिर होते. येथे आलेले भाविक, शरयू मध्ये स्नान करून रामाच्या दर्शनाला जात असत. रामनवमी व कार्तिक पौर्णिमेला येथे मोठा उत्सव होत असे व भक्तांची गर्दी होत असे.

१२ व्या शतकातील मंदिर त्या आधीच्या १० व्या शतकातील मंदिराच्या स्थानावर उभे होते. आणि त्या आधी, या ठिकाणी, गुप्तोत्तर काळात एक गोलाकार मंदिर होते. इस पूर्व २ ऱ्या सहस्रकापासून या ठिकाणी एक धार्मिक स्थळ होते. उत्खननातील पुराव्यांवरून निश्चितपणे हे लक्षात येते की हिंदू भाविकांनी सातत्याने या ठिकाणी रामाची पूजा केली आहे.

पाश्चिमात्य इतिहास शास्त्र असे आहे की – मौखिक परंपरेने जपलेले काव्य शेकडो लोकांनी जसेच्या तसे म्हणून दाखवले तरी त्याला ‘ऐतिहासिक’ता मिळत नाही. पण तेच जर दोन – चारशे वर्षांपूर्वीच्या कुठल्या कागदावर लिहिलेले सापडले, तर तो कागद ‘ऐतिहासिक’ दस्तावेज होतो. आणि जर तेच काव्य एक – दोन हजार वर्षांपूर्वीच्या राजाने शिळेवर कोरून ठेवलेले मिळाले, तर तो त्या काव्याच्या प्राचीनतेचा सर्वाधिक विश्वसनीय पुरावा! म्हणूनच दगडात कोरलेली कथा, शिल्प किंवा मंदिर यांना इतिहास शास्त्रात अतिशय महत्वाचे स्थान आहे. दगडात लिहिलेला लेख खोडायचा जरी प्रयत्न केला, तरी खाडाखोड दिसते. दगडातून मूर्ती कोरतांना जर चूक झाली, तर ती लपवता येत नाही. यामुळेच एखादी गोष्ट किती पक्की आहे हे सांगतांना “काळ्या दगडावरची रेघ” असे म्हटले जाते. अशा दगडातील पुराव्यामुळेच रामाला त्याची जन्मभूमी परत मिळाली. कारण … दगड कधीच खोटे बोलत नाही …

संदर्भ –

मीनाक्षी जैन, बी बी लाल व के के मुहम्मद यांनी दिलेल्या मुलाखती.
 
 
 
#१५ सह्याद्रीतील गुंफा
इ.स. पूर्व पाहिले शतक. शुर्परक (आजचे सोपारा) आणि कल्याण या दोन व्यापारी बंदरांवर रोम मधून व्यापारी जहाजे येत असत. रोम मधून आलेल्या वस्तू इथून इतर राज्यांत रवाना होत. पश्चिम किनाऱ्यावरील बंदरांना सह्याद्रीच्या पलीकडे असलेल्या देशाशी  जोडणारा मुख्य मार्ग होता नाणेघाट. सह्याद्रीची मोठी पर्वतरांग ओलांडण्या करिता नाणेघाट हा एक सोपा रस्ता होता. या भागावर ज्याचे राज्य असे, त्याला व्यापाऱ्यांकडून जकात मिळत असे. या व्यापाराने अनेक राज्ये भरभराटीस आली. नाणे घाटात एका मोठ्या रांजणात जकात भरून व्यापारी जीर्णनगर (जुन्नर), निधीनिवास (नेवासा), नाशिक, तगर (तेर) आणि प्रतिष्ठान (पैठणला) या ठिकाणी जात.

नाणे घाट हा इ.स. पूर्व पहिल्या शतकातील एक प्रसिद्ध व्यापारी थांबा आणि मार्गही होता. या घाटात असणारी गुहा आजही या वैभवशाली काळाची साक्ष देते. या गुहेत एक मोठा शिलालेख आहे. त्या मध्ये नागनिका राणीने व सातवाहन राजाने केलेल्या यज्ञांचा व मोठ्या प्रमाणावर केलेल्या  दानधर्माचा उल्लेख आला आहे. पूर्वी या गुहेत राजाचा, राणीचा पुतळा देखील होता. आता मात्र तो नष्ट झाला आहे. या राणीने तिचे दोन्ही पुत्र सज्ञान होईपर्यंत २१ वर्षे अतिशय कुशलतेने राज्यकारभार सांभाळला होता.

नाणेघाटातील गुहेप्रमाणे भारतात ठिकठिकाणी अनेक शैलगृहे (rock shelters) आढळतात. या शैलगृहांचा (rock shelters) प्रवास सुरू होतो तो मौर्य काळात. राजा अशोक आणि त्याचा नातू दशरथ याने बिहार मधील बाराबर टेकड्यांमध्ये आजीवक पंथासाठी एक गुहा खोदली. लोमेष ऋषी गुंफा म्हणून ही गुहा ओळखली जाते. अशी शैलगृहे नंतरच्या काळात सार्थवाहांसाठी (व्यापारी तांडे) विश्रांतीचे ठिकाण बनली आणि त्याच बरोबर बौद्धधर्म प्रसाराची मुख्य केंद्रही झाली.पूर्वी सार्थवाहांबरोबर (व्यापारी तांडे) बौद्ध भिक्षूही प्रवास करीत आणि धर्म प्रसाराचे काम करीत. महाराष्ट्रातील व्यापारी मार्गांवरची ही लेणी या बौद्ध भिक्षूंची आश्रयस्थाने किंवा वर्षावास (वर्षावास म्हणजे पावसाळ्यामध्ये असणारे निवासस्थान) असत.

भारतामध्ये साधारणपणे १५०० शैलगृहे (rock shelters) आहेत. आणि यातली जवळपास ९०० ते १००० शैलगृहे महाराष्ट्रात आहेत. बरीचशी शैलगृहे ही तत्कालीन व्यापारी मार्गांवर दिसून येतात. महाराष्ट्रातील या शैलगृहाना आधार आहे तो सह्याद्रीचा. अतिशय टणक आणि अभेद्य अशा बसाल्ट (basalt) या अग्निज खडकापासून (igneous rock) पासून बनलेला सह्याद्री अजिंक्य आहे. या सह्याद्रीच्या डोंगररांगांनी शैलगृहांच्या निर्मितीचा पाया रचला.

शैलगृहे खोदताना कारागिरांसमोर सर्वात मोठे आव्हान असे ते म्हणजे गुहेसाठी योग्य डोंगर शोधणे आणि गुहेचा आराखडा बनवणे. हा गुहेचा आराखडा बनवताना कारागिरांना इमारतीच्या बांधकामाचा अनुभव कामास आला. आणि इमारतींमध्ये असणाऱ्या सगळ्या बारीसारीक तपशिलासह ही शैलगृहे उभी राहू लागली. याचे उत्तम उदाहरण म्हणजे भाजे लेणी. या लेण्यांमध्ये छताला इमारतीच्या बांधकामाप्रमाणे लाकडी तुळया लावलेल्या दिसतात. या लाकडी तुळयांचे लाकूड आज २००० वर्षानंतरही शाबूत आहे. पश्चिम महाराष्ट्रातील सर्वात प्राचीन लेण्यां मध्ये भाजे लेण्यांचां समावेश आहे.

ही प्राचीन लेणी धार्मिक समरसतेची ग्वाही देतात. वेरूळ येथे असणाऱ्या लेण्यांमध्ये जैन, बौद्ध आणि हिंदू धर्माची लेणी दिसतात.

महाराष्ट्रातील शैलगृहांची किंवा लेण्यांची निर्मिती वेगवेगळ्या राजवंशाच्या कालखंडात झाली. इ.स. पूर्व पहिल्या शतकात सातवाहन घराण्याचा संस्थापक असलेल्या सिमुक राजापासून या घराण्याने ४०० वर्षे राज्य केले. यातल्या अधिकांश कालखंडात पूर्व आणि पश्चिम समुद्राच्या मध्य भूमीवर यांचे वर्चस्व होते. महाराष्ट्राच्या इतिहासाची सुरुवात ही सातवाहन घराण्यापसूनच करावी लागते. या राजांनी करवून घेतलेल्या अनेक गुहा सह्याद्री मध्ये आहेत. राज्ञी नागनिकेचा नाणेघाटातील शिलालेख त्यांची  दैदिप्यमान परंपरा आणि धार्मिक वृत्तीची साक्ष देतो.

– विनिता हिरेमठ

 
 
The Dynasties of Maharashtra
Published on January 7, 2017 by Atul Sabnis
An overview of the various dynasties that ruled the region that is now Maharashtra, from 230 BCE – 1300 CE. A very short description of all these dynasties follows.

We are very grateful to Brigadier Gerard, who had first posted this as a sketch on Twitter, and gave us permission adapt it and post it here.

Dynasties of Maharashtra
Click to view large size
The Dynasties of Maharashtra
Most of the content below is sourced from Wikipedia. Apart from this, some references have been made to various books listed at the end.

Advertisement
A note on dates: You will notice some discrepancies in the dates in the infographic above and sources (including Wikipedia). This is primarily due to how historians interpret dates. Some take it starting from when a dynasty was established, some take it at later time. Most of the dynasties listed below were vassals or feudatories of the dynasties that preceded them. In such situations, they were semi-independent to an extent.

Sātavāhan
The Satavahana dynasty ruled the Deccan region between 230 BCE – 225 CE. They were probably vassals of the Mauryas, and established their supremacy in the Deccan after the decline of the Maurya Empire. The dynasty was established by Simuka, however, Gautamiputra Satakarni (86–110 CE) is the most well-known king of this dynasty. The Satavahanas ruled from Pratishthana (modern-day Paithan) and Amravati (Dist. Guntur, Andhra Pradesh) [Link]

Vākāṭaka
The Satavahanas were succeeded by the Vakatakas, who ruled during 250 – 525 CE, with their capital at Nandivardhana (modern-day Nandardhan, near Ramtek) and Vatsagulma (modern-day Washim). This dynasty was founded by Vindhyashakti (c. 250 – c. 270 CE). Vakatakas are known for their patronage of art & architecture. The famous Ajanta caves, were built by under the patronage of Vakataka emperor, Harishena. [Link]

Kālāchuri
The Kalachuri dynasty, ruled in Ujjayini, Vidisha, and Anandapura; and their capital was Mahishmati, which lies along the banks of the Narmada River. Not much is known about the founder of this dynasty; the earliest mentioned king was called Krishnaraja. Like the Vakatakas, the Kalachuris were also patrons of art & architecture. The Elephanta caves and the early Ellora caves were built under their patronage. [Link]

Chalukyas of Vatapi (Badami)
One of the most significant dynasties of the Deccan, the early Chalukyas, or the Chalukyas of Vatapi ruled a large area of the Deccan between 550 – 760 CE, covering the entire region between the Narmada and the Kaveri rivers. Their rule is considered to be an era of prosperity. It also saw the birth of a new architectural style called Chalukyan architecture. The Chalukyas were natives of Karnataka; this dynasty was founded by Pulakeshin I. [Link]

Rāṣṭrakūṭa
The Rashtrakuta dynasty ruled most of the Indian subcontinent, between 753 – 973 CE, with their capital at Manyakheta (Modern-day Malkhed). The Rashtrakutas were feudatories of the Chalukyas of Vatapi and at peak, the Rashtrakutas ruled from the Ganges River to Cape Comorin. This period saw the development of many literary works as well as development of architecture, which include the Kailashnath temple at Ellora and the Jain Narayana Temple at Pattadakal. [Link]

Śilāhāra
The Silahara were vassals of the Rashtrakutas and were split in three branches: North Konkan, South Konkan, and Kolhapur. Across these three branches, the Silaharas ruled between 765 – 1215 CE. The Northern branch was founded by Kapardin, and their capital was Puri (modern-day Rajapur, in the Raigad district). The Silaharas of Kolhapur originally ruled from Karad, and later shifted their capital to Kolhapur. The Panhala fort, near Kolhapur was originally built by the Silahara ruler, Bhoja II between 1178 and 1209 CE. [Link]

Chalukyas of Kalyani
The Chalukyas of Kalyani, or the Western Chalukyas, ruled the Indian subcontinent during 973 CE – 1180 CE, with their capital, earlier at Manyakheta, and later at Kalyani (modern-day Basavakalyan). Major ruling families of the Deccan, the Hoysalas, the Seuna Yadavas of Devagiri, the Kakatiya dynasty and the Southern Kalachuris of Kalyani, were subordinates of the Western Chalukyas. The Western Chalukyan architectural style is well known as the transitional style between the earlier Chalukyas and the Hoysalas. [Link]

Kadamba
The Kadamba dynasty ruled northern Karnataka and the Konkan from Banavasi. The dynasty was founded by Mayurasharma in 345 CE. Kadambas were the first rulers to use Kannada as another official administrative language. The Kadambas of Goa, first ruled from Chandor, and laters shifted their capital to Gopakapattana (Goa). The Kadambas of Goa ruled between 960 – 1310 CE and succumbed to the Seuna Yadavs. [Link]

Seuna Yadav
The Seuna Yadavs were feudatories of the Western Chalukyas, and established their independence as the Chalukyan power declined. The Yadavas of Devgiris, as they are also known, ruled from 1189 – 1310 CE, from Devgiri (modern-day Daulatabad). The name Seuna comes from Seunachandra, who originally ruled a region called Seunadesha (modern-day Khandesh), this dynasty was established by Bhillama V (1173–1192 CE). Singhana II (1200–1247 CE), however is considered the greatest ruler of this dynasty who expanded the Seuna kingdom. In 1317 CE, this kingdom was annexed by the Khilji Sultanate. [Link]

References
A., N. S. (1976). A history of South India from prehistoric times to the fall of Vijayanagar. Madras: Oxford University Press.
Bhāndārkar, R. G. (1957). Early History of the Dekkan. Calcutta: Gupta.
Nagpur District Gazetteer. (n.d.). Retrieved January 07, 2017, from https://web.archive.org/web/20060603010304/http://www.maharashtra.gov.in/english/gazetteer/FINAL_GAZETTEE/his1.html
Sharma, L. P. (1987). History of Ancient India: (pre-historic age to 1200 A.D.). New Delhi: Konark .
Singh, U. (2008). A history of ancient and early medieval India: from the Stone Age to the 12th century. New Delhi: Pearson Education.
 
 
 
सिंधूसंस्कृती आणि महाराष्ट्रातल्या आद्य वसाहती
(मध्यंतरी मुंबईतल्या पुरातत्वदिनानिमित्त माझ्याकडून एक छोटास्सा लेख संबंधित व्यक्तींनी मागवून घेतला होता. काही कारणांमुळे प्रसिद्ध होऊ शकला नाही असं त्यांनी कळवलं होतं. आज अचानक आठवलं म्हणून इथे टाकतेय. शब्दमर्यादा असल्याने संक्षिप्तात लिहिला होता. वेळ मिळाला की अपडेट करेन Happy )

सिंधूसंस्कृती म्हणलं की आपल्या डोळ्यापुढे प्रामुख्याने येतात ती आताच्या पाकिस्तानमधे उदयाला आलेली आखीवरेखीव नियोजनबद्ध शहरं आणि भरभराटीचा व्यापार. पण त्यावेळी भारताच्या इतर प्रदेशांमधे, विशेषतः महाराष्ट्रात, काय परिस्थिती होती? इथल्या लोकसमूहांची जीवनशैली कशी होती? सिंधूसंस्कृतीचे आणि त्यांचे काही आपसात संबंध होते का? एक ना अनेक प्रश्न आपल्या सगळ्यांनाच कधी ना कधी पडलेले असतात. त्यातल्याच काही प्रश्नांचा थोडक्यात घेतलेला हा मागोवा...

सुमारे दहा लाख चौरस किलोमीटर पसरलेल्या नागरी सिंधू संस्कृतीच्या सीमा पाकिस्तान-इराणच्या सीमेपासून ते गुजरातपर्यंत विस्तारलेल्या होत्या. आजच्या भारतासारखीच जशी अवाढव्य शहरं होती तशीच छोटी खेडेगावं, वाड्या-वस्त्या पण होत्या. शहरी व्यापार्‍यांपासून भटक्या मेंढपाळापर्यंत सगळ्या प्रकारचे लोक या भूभागात परस्परसान्निध्यात रहात होते. सिंधूसंस्कृतीच्या नागरी कालखंडात (इ.स.पू. २६०० - २०००) भारतीय उपखंडाच्या बहुतेक सर्व प्रदेशांमधील लोकसमूह भटक्या शिकारी जीवनाकडून स्थायी शेतकरी जीवनाकडे वाटचाल करत होते असं दिसतं. यातल्या शेजारपाजारच्या लोकसमूहांशी सिंधूसंस्कृतीचे देवाणघेवाणीचे संबंध होते याचे पुरातात्त्विक पुरावेही उपलब्ध आहेत.

दख्खनचं पठार मात्र या सांस्कृतिक देवाणीघेवाणीच्या मुख्य धारेपासून थोडंसं दूर होतं. महाराष्ट्रात आदिमानवाचा वावर सुमारे ७ -८ लाख वर्षांपासून होता असे दिसून येते. सुमारे साडेचार हजार वर्षांपूर्वी महाराष्ट्रात शेतीच्या तंत्रज्ञानाचा प्रसार व्हायला हळुहळू सुरूवात झाली. आपल्या आधी राजस्थान, गुजरात, माळवा या प्रदेशांमधे शेती करणारा समाज उदयाला आला होता. त्यांच्याकडूनच उपजीविकेच्या या नव्या तंत्राची ओळख दख्खनच्या पठारावर रहाणार्‍या मानवसमूहाला झाली असं दिसतं. सर्वात प्रथम तापीच्या खोर्‍यात, खानदेशात या वसाहती उदयाला आल्या असं दिसतं. सुरुवातीची गावं हंगामी होती, जितकी शेतीवर तितकीच शिकार आणि पशुपालनावर अवलंबून होती. अशी हंगामी गावं लौकरच कायमस्वरूपी स्थिरावली, शेतीच्या तंत्रातही प्रगती झाली आणी त्यांचे रूपही पालटले. आजवर महाराष्ट्रात अशी सुमारे दीडशेच्यावर स्थळं उजेडात आली आहेत. या लोकसमूहांना अजून लोहतंत्रज्ञान अवगत झालेलं नव्हतं. फक्त तांबं आणि दगड यांचा वापर ते करत असत म्हणून त्यांना ताम्रपाषाणयुगीन संस्कृती असं म्हणलं जातं.
सुरुवातीच्या या हंगामी गावांमधली लोकं गोल खड्डा करून त्यावर झोपडी बांधून रहात असत. त्यांची मातीची भांडी फारशी पक्की भाजलेली नसत. लाल रंगावर काळ्या-तपकिरी रंगाची नक्षी किंवा काळ्या रंगावर लाल नक्षी काढलेली असे. यात विविध प्राणी, पक्षी, शस्त्रास्त्रं अशी चित्रसंपदा आढळते. मात्र सुमारे इ.स.पू १८०० च्या आसपास या वसाहतींमधे सांस्कृतिक बदल झालेले दिसायला लागतात. परत एकदा गुजरातमधल्या वसाहती याला कारणीभूत होत्या.
सुमारे इ.स.पू २००० पासून सिंधुसंस्कृतीची नागरी व्यवस्थेचा र्‍हास होण्यास सुरुवात झालेली दिसते. पर्यावरणीय प्रतिकूलता, जवळजवळ ठप्प झालेला परदेशी व्यापार अशा आणि इतर कारणांमुळे नगरं उजाड झाली, लेखनकला विस्मृतीत जायला लागली आणि सगळा समाज परत एकदा ग्रामीण संस्कृतीकडे परतला. गुजरातेतल्या सिंधू संस्कृतीच्या वसाहतीही याला अपवाद नव्हत्या. तिथे आधीपासूनच असलेल्या स्थायी शेतकरी वसाहती आता पर्यावरणीय प्रतिकूलतेमुळे अर्धभटक्या पशुपालक झाल्या आणि चराऊ कुरणांच्या शोधात सोनगढच्या खिंडीतून खानदेशाकडे येऊ लागल्या. आणि त्यांच्याशी असलेल्या सांस्कृतिक देवाणघेवाणीतून, त्यांच्या इथे झालेल्या स्थलांतरातून सिंधूसंस्कृतीच्या जीवनशैलीचा प्रभाव खानदेश आणि प्रवरेच्या खोर्‍यात असलेल्या लोकसमूहांवर झालेला दिसतो.
आजवर सुमारे २५ उत्तर सिंधू संस्कृतीच्या वसाहतींची नोंदणी तापीच्या खोर्‍यात झाली असली तरी त्यांच्या जीवनशैलीबद्दल विस्ताराने जाणून घेता आलं ते प्रवरेच्या खोर्‍यातील दायमाबादच्या उत्खननामुळे. दख्खनच्या ताम्रपाषाणयुगीन संस्कृतीच्या या सर्वात मोठ्या वसाहतीत असं दिसून आलं की नागरीकरण लयाला गेलं असलं, तरी इतक्या शतकांनंतरही घरबांधणीच्या भूमितीत बदल झाला नव्हता. आता भाजक्या मातीच्या विटा नव्हत्या, तर कच्ची भेंडं वापरून घरं बनवली जात होती. पण विटांचा आकार मात्र अजूनही ४:२:१ अशाच मापात होता. भिंती अजूनही अचूक काटकोनात उभारल्या जात होत्या. आणि मृतांची दफनंही आधीच्या पद्धतीने खड्डा खणून केली जात होती. पूर्वीच्या सुंदर नक्षी असलेल्या मातीच्या मडक्यांऐवजी आता फार उत्तमरीतीने भाजलेली, सिंधूसंकृतीच्या नागरी कालखंडातल्या मडक्यांशी साधर्म्य सांगणारी काळ्या रंगाची भौमितिक नक्षी काढलेली लाल रंगाची मडकी वापरली जाऊ लागली. अर्थात उपजीविकेच्या पद्धतीत मात्र फरक पडला नाही. आधीप्रमाणेच पशुपालन, शेती आणि शिकार यावर त्यांचं जीवन अवलंबून होतं. यांचेही गुजरात-राजस्थान-माळवा येथील ताम्रपाषाणयुगीन वसाहतींशी देवाणघेवाणीचे संबंध होते.
तसंच या उत्खननात सिंधूसंस्कृतीची लिपी कोरलेल्या दोन वर्तुळाकार मातीच्या मुद्रा आणि चार खापराचे तुकडे मिळाले. ही लिपी अजूनही वाचता न आल्याने त्यावर काय लिहिलंय ते जरी अज्ञात असलं तरी हा नागरी संस्कृतीचा वारसा इतक्या शतकांनंतर इतक्या दूरवरच्या प्रदेशात जपला गेल्याचं महत्व कमी होत नाही.
यात सगळ्यात सनसनाटी, लक्ष वेधून घेणारा शोध ठरला तो म्हणजे या पांढरीच्या टेकाडावर एका शेतकर्‍याला मिळालेल्या चार ब्रॉन्झच्या मूर्ती. दोन बैलांचा रथ हाकणारा माणूस, गेंडा, म्हैस आणि हत्ती. विशेष म्हणजे या सगळ्यांना खाली चाकं आहेत. अभ्यासकांच्या मते ही खेळणी नसून यांचा संबंध धार्मिक श्रद्धा समजुतींशी असणार व कदाचित मिरवणुकीसारख्या कुठल्या विधीत यांचा वापर होत असण्याची शक्यता असावी. जरी या मूर्तींच्या कालनिर्णयाविषयी वाद आहेत, तरीही बहुसंख्य अभ्यासकांच्या मते या उत्तर सिंधू संस्कृतीशी संबंधितच आहेत.
गुजरातेतून आलेले हे सांस्कृतिक प्रभाव इथल्या लोकसमूहाच्या जीवनशैलीत मिसळून गेले. जरी नंतरच्या ताम्रपाषाणयुगीन कालखंडात ही घरबांधणी, लिपी लोप पावलेली दिसते तरी त्यांचे कर्ते इथल्या लोकसमूहात एकरूप होऊन गेले असणार.
मराठी असणं, दख्खनी असणं म्हणजे काय यावर भरपूर उहापोह करता येईल. पण एखादी प्रादेशिक अस्मिता जेव्हा निर्माण होते तेव्हा ती कितीही स्वतंत्र असली तरी तिच्या आसपासच्या संस्कृतींपेक्षा, प्रादेशिकतेपेक्षा वेगळी, अलिप्त राहू शकत नाही याचं भान आपल्याला राखलं पाहिजे. महाराष्ट्राच्या जडणघडणीत गेल्या चार-साडेचार हजार वर्षांत अनेक लोकसमूह, त्यांचे सांस्कृतिक प्रभाव आले, इथल्या मातीत मिसळले, रुजले आणि संस्कृतीची नदी वाहती राहिली. आज त्या सगळ्यांची स्मृती राहिलीच आहे असं नाही, त्यांचे वेगवेगळे रंग सांगता येणार नाहीत असे मिसळून गेलेत. पण यात सुदूर वायव्य भारतातल्या नागरी सिंधू संस्कृतीचाही एक प्रवाह कधी काळी येऊन मिळालाय, कुठेतरी एकाच धाग्याने हे पश्चिम आणि वायव्य भारतातले प्रदेश जोडले गेले होते इतकं आपण सर्वांनी लक्षात ठेवलं तरी खूप आहे!

हरप्पा व मोहेंजादारो ते दख्खन पठारचा "सिंधू संस्कृती" चा प्रवास आणि स्थिरता, प्रगती आणि प्रसार....या मुद्द्यांना धरून हा लेखनप्रपंच असल्याचे दिसत्ये. जर क्रमशः असेल तर या विषयात गम्य आणि रुची असणार्‍यांच्या दृष्टीने हे लेखन सुखद वाचनाचा आनंद निर्माण करून देईल हे नि:संशय.

लेखिका वरदा यानी सिंधू संस्कृतीच्या र्‍हासाची कारणे देताना वर असे म्हटले आहे, "...इ.स.पू २००० पासून सिंधुसंस्कृतीची नागरी व्यवस्थेचा र्‍हास होण्यास सुरुवात झालेली दिसते. पर्यावरणीय प्रतिकूलता, जवळजवळ ठप्प झालेला परदेशी व्यापार अशा आणि इतर कारणांमुळे नगरं उजाड झाली,..." ~ यातील कारणे मान्य होण्यासारखी आहेतच पण प्रमुख कारण होते 'आर्यांचे' झालेले सिंधू संस्कृतीवरील विनाशक असे आक्रमण...त्याचा उल्लेख लेखात होणे गरजेचे आहे. आर्य {तसेच त्यांच्या आगेमागे येत राहिलेल्या हूण, शक, यवन अशा टोळ्यानीही} टोळ्यांचे भारतातील - खरे तर हिंदुस्थानातील म्हणायला हवे - आगमन हे एक निर्घृण प्रकारचेच होते अन् त्याचे दूरगामी परिणाम म्हणजे बहराला आलेली सिंधू संस्कृती हळुहळू लयाला जाऊ लागली.

अर्थात इतिहास संशोधक असेही मानतात की, आर्यानी 'सिंधू संस्कृतीचा नाश केला असे म्हणण्याऐवजी त्यानी हरप्पा व मोहेंजोदारो ही नगरे नष्ट केली...'. तरीही या दोन नगरांमध्ये वसलेली संस्कृती [जी विशेषकरून कृषिप्रधानच होती] त्या अगोदरच बाहेर दूरवर पसरली होती....उदा. दख्खन पठाराचा वर लेखात उल्लेख आलेला आहेच....त्यामुळे आर्यांच्या आक्रमणानंतरही सिंधू संस्कृती तग धरून राहिल्याच्या खुणा होत्याच.

असो... लेखमाला चालू राहिल्यास अजूनही विस्ताराने चर्चा करता येईल असे वाटते.

अशोक पाटील

[अवांतर : लेखात एके ठिकाणी ... "सुरुवातीच्या या हंगामी गावांमधली लोकं गोल खड्डा करून त्यावर झोपडी बांधून रहात असत...." असे म्हटले गेले आहे. यातील 'गोल खड्डा' ऐवजी 'एक वर्तुळ' चे योजन योग्य वाटेल. 'खड्ड्या' ला विशिष्ट अशा खोलीचा संकेत आहे. त्या संस्कृतीतील लोक कुटुंबाच्या आकारानुसार जमिनीवर आवश्यक त्या मापाचे वर्तुळ आखत आणि त्यावर झोपडी बांधत. अर्थात त्या वर्तुळाला दगडविटांची आकृतीबंध जोड दिली की किमान सहा इंच खड्डा भासत असे हे मान्य....पण मूळ खड्डा संबोधनाची व्याख्या त्या वर्तुळाला लावणे योग्य ठरणार नाही.]

'आर्यांचे आक्रमण' ही कल्पना अग्राह्य आहे हे अनेक संशोधनांमधून सिध्द झाले आहे.

'आर्यांचे सिंधूसंस्कृतीवर आक्रमण' ही तर कवी कल्पना आहे. माझ्या माहीतीप्रमाणे पुरातत्वज्ञ मॉर्टिमर व्हीलर याने प्रथम हराप्पा येथे सापड्लेले सांगाडे हे 'पुरंदर इंद्राने 'नगरे' फोडून तेथील लोकांना मारले' ह्या ऋग्वेदीय कल्पनेचे पुरातत्वीय वास्तव मानले. हे अर्थातच चूक होते कारण सर्व सांगाडे वेगवेगळ्या कालखण्डामधील होते.
सिंधूसंस्कृती व ऋग्वेद्/आर्य यांचा संबंध व अ-संबंध लावणारे विविध पुरावे समोर येत असतात व विश्लेषणे होत असतात. तरीही आर्यांचे आक्रमण ही मुळात भाषिक साम्यावरून केलेली कल्पना आहे व सिंधूसंस्कृतीची लिपी अजून आपण वाचु शकत नाही. त्यामुळे तोपर्यंत निर्णायक पुरावा तयार होउ शकत नाही हे लक्षात घेतले पाहिजे.
'आगमन हे एक निर्घृण प्रकारचेच होते' अशा प्रकारचे उल्लेख म्हणूनच योग्य नाहीत असे मला वाटते.
अशोक यांनी त्यांच्या मुद्द्यासाठी कुठल्या पुस्तकाचा/ ग्रंथाचा आधार घेतला आहे हे कळले तर बरे होईल.

वरदा, उत्तम लेख. (अजून विस्ताराने लिही बघू)

मला वरदा हा विषय कसा विस्तृत करून मांड्ते हे वाचायची उत्सुकता आहे.>> +१.

सुमारे इ.स.पू २००० पासून सिंधुसंस्कृतीची नागरी व्यवस्थेचा र्‍हास होण्यास सुरुवात झालेली दिसते. पर्यावरणीय प्रतिकूलता, जवळजवळ ठप्प झालेला परदेशी व्यापार अशा आणि इतर कारणांमुळे नगरं उजाड झाली, लेखनकला विस्मृतीत जायला लागली आणि सगळा समाज परत एकदा ग्रामीण संस्कृतीकडे परतला.>>> याबद्दल विस्ताराने सांगशील का? हे असं "विकासाकडून भकासाकडे" चाक उलटं फिरू शकतं का? हा असा एवढा मोठा बदल होऊन यायला साधारण किती काळ जावा लागला असेल?

पण प्रमुख कारण होते 'आर्यांचे' झालेले सिंधू संस्कृतीवरील विनाशक असे आक्रमण...त्याचा उल्लेख लेखात होणे गरजेचे आहे. आर्य {तसेच त्यांच्या आगेमागे येत राहिलेल्या हूण, शक, यवन अशा टोळ्यानीही} टोळ्यांचे भारतातील - खरे तर हिंदुस्थानातील म्हणायला हवे - आगमन हे एक निर्घृण प्रकारचेच होते अन् त्याचे दूरगामी परिणाम म्हणजे बहराला आलेली सिंधू संस्कृती हळुहळू लयाला जाऊ लागली.>>>>>>अनुमोदन,अशोक पाटील अगदी योग्य मत.
लेखिकेने जाणूनबुजून उल्लेख टाळला आहे हे स्पष्ट आहे.आर्यांचे आक्रमण हा विषय दाबण्याचा प्रयत्न हिंदूत्ववादी नेहमीच करत असतात, इथे माबोवरचे अनेकजण लॉजिकल चर्चा करायची अपेक्षा ठेवतात ,मात्र आर्यवादाच्या चर्चेला सोइस्कर बगल देतात.परखड मुद्दा मांडल्याबद्दल पाटीलसरांचे आभार.

<'आर्यांचे सिंधूसंस्कृतीवर आक्रमण' ही तर कवी कल्पना आहे.>>
लोकमान्य टीळकांनी त्यांच्या आर्टीक्ट होम इन वेदाज या ग्रंथात अग्निपुजक आर्य थेअरीला दुजोरा दिला आहे, टीळक कवी होते काय? Proud

अशोक -
१. <<हरप्पा व मोहेंजादारो ते दख्खन पठारचा "सिंधू संस्कृती" चा प्रवास आणि स्थिरता, प्रगती आणि प्रसार....या मुद्द्यांना धरून हा लेखनप्रपंच असल्याचे दिसत्ये.>> लेखाचा मुद्दा वेगळा आहे - सुदूर सिंधू संस्कृतीशी दख्खनच्या पठाराचा, इथल्या वसाहतींचा काही संबंध होता का हा आहे. यात दख्खनचं पठार व इथल्या आद्य वसाहती सिंधू नागरी संस्कृतीच्या परिघाबाहेर होत्या हे अनुस्यूतच आहे. शिवाय सिंधू संस्कृतीची स्थिरता, प्रगती हेही मुद्दे याच्यात अंतर्भूत नाहीत
२.आर्यांचे सिंधूसंस्कृतीवरील आक्रमण हा आता पुरातत्वासाठी जवळपास मृत झालेला सिद्धांत आहे. आर्य या शब्दाचा अर्थ अभ्यासक आर्य भाषा बोलणारे असा लावतात. आता विशिष्ट भाषिक लोक वेगळे असे पुरातत्वीय पुराव्यात ओळखू येणं पुराभिलेख नसले तर जवळजवळ अशक्य आहे. त्यामुळे आर्यांचं स्थलांतर (आक्रमण नव्हे) हा पुरातत्वीय मार्गाने वेध न घेता येणारा प्रश्न आहे. हा हिस्टॉरिकल लिन्ग्विस्टिक्सच्या अखत्यारीतला प्रश्न आहे हे समस्त व्यावसायिक पुरातत्वीयांनी मान्य केलेलं आहे. (वरती मनीषाने सुद्धा वेगळ्या शब्दांत हेच लिहिले आहे) मुळातच इतक्या शेकडो ठिकाणी उत्खनन झाल्यानंतरही कुठेही युद्धाचा पुरावा मिळालेला नाही. त्यामुळे पुरातत्व सिंधूसंस्कृतीच्या र्‍हासासाठी कुठलंच युद्धजन्य कारण ग्राह्य धरणार नाही.अनेको दशके चाललेल्या पुरातत्वीय पुरावे, पुरापर्यावरणीय पुरावे, मेसोपोटेमियातील तत्कालीन घडामोडी अशा आणि इतर विविध विश्लेषण-संशोधनाने सिंधू संस्कृतीच्या नागरीकरणाचा र्‍हास कसा झाला यावर पुरातत्वीयांनी केलेल्या भाष्याचं सार म्हणजे 'पर्यावरणीय प्रतिकूलता, जवळजवळ ठप्प झालेला परदेशी व्यापार अशा आणि इतर कारणांमुळे नगरं उजाड झाली,....'

यात माझे शब्द नीट वाचलेत तर लक्षात येईल की मी कुठेही सिंधू संस्कृतीचा विनाश झाला असं म्हणत नाहीये तर नागरीकरणाचा र्‍हास झाला असं म्हणलं आहे. या ग्रामीण झालेल्याअ उत्तर सिंधू काळातल्या विविध प्रादेशिक संस्कृतींमधूनच लोहयुग आणी नंतर आद्य ऐतिहासिक काळ उदयाला आला. मानवी वसाहतींच्या इतिहासरेषेमधे इथे कुठेही खंड पडलेला दिसत नाही

मुळात सुमारे इ.स.पू १५०० च्या आसपास आर्यभाषिक लोकसमूहांचं अस्तित्व भारतीय उपखंडात जाणवायला लागतं. ते इथलेच का बाहेरून आले, आधी कुठे होते हे पुरातत्व सांगू शकत नाही. पण भाषिक पुरावे वायव्य सीमेच्या पल्याड निर्देश करतात हे आम्ही बहुतांशी पुरातत्वज्ञ मान्य करून पुढचे विश्लेषण करतो.

३. <<या दोन नगरांमध्ये वसलेली संस्कृती [जी विशेषकरून कृषिप्रधानच होती] त्या अगोदरच बाहेर दूरवर पसरली होती....उदा. दख्खन पठाराचा...>> सिंधू कृषिप्रधान संस्कृती नव्हती तर अतिशय कॉम्प्लेक्स अशी नागरी अर्थव्यवस्था होती आणि त्यात अंतर्गत व लांबपल्ल्याचा व्यापार, विविध प्रकारच्या कारागिरी वस्तूंचे उत्पादन, शेती, पशुपालन, इ. सर्व मार्गांचा समावेश होता. त्याचबरोबर उरलेल्या भारतीय उपखंडात त्याकाळी ज्या ग्रामीण संस्कृती उदयाला आल्या त्यात सिंधू संस्कृतीचा कुठलाही वाटा नव्हता. या घडामोडी स्वतंत्र पातळीवर झाल्या. दख्खनचे पठार त्यातीलच एक.

४. शक, हूण, यवन, यांचे कालखंड आणि वरील लेखातील कालखंडात काही हजार वर्षांचं अंतर आहे. शक, हूण, यवन हेही एकमेकांना समकालीन नव्हेत. यातील हूणांनी स्वार्‍या केल्या पण शक स्थलांतर करत करत मध्य आशियातून भारतीय उपखंडात आले. इथलेच होऊन गेले. उगाचच त्यांना निर्घृण वगैरे म्हणण्यात अर्थ नाही. यवन म्हणजे साधारणपणे ग्रीक, इंडो ग्रीक. यांनीही कधी आक्रमणं केली नाहीत..

५. मी जेव्हा गोल खड्डा करून रहात होते असं लिहिलं तेव्हा मी pit dwelling चं भाषांतर केलं आहे. आणि जमिनीत खड्डा करणं हेच इथे अभिप्रेत आहे. गोल घरं पण मिळाली आहेत पण ती आणि ही खड्डेवाली घरं वेगळी. अधिक माहितीसाठी तुम्ही महाराष्ट्राचा आदिम इतिहास या माझ्या मायबोलीवरच्याच लेखातील प्रकाशचित्र कृपया बघा

@येऊकामी -
ह्युमन जेनोम प्रोजेक्ट अजून चालू आहे आणि त्यांचे भारताविषयीचे निष्कर्ष पुरातत्वीयांनी केलेल्या शास्त्रीय कालमापनाशी जुळत नाहीत. लाख वर्षांपूर्वी काही जेनोम्स भारतात आले असतील पण पूर्ण मानवी समूहच फक्त एक लाख वर्षांपूर्वीचा आहे हे इतक्या विविध दशकं आंतरराष्ट्रीय पातळीवर विविध शास्त्रज्ञगटांनी केलेल्या अनेको पुरातत्वीय स्थळांच्या कालमापनाशी विसंगत आहे.

अशोक पाटील नेहेमीच अत्यंत प्रामाणिकपणे प्रतिसाद देतात त्यामुळे त्यांना मी आवर्जून उत्तरं दिली. पण येऊकामी या आयडीला आर्य-हिंदुत्व या विषयावर काड्या करून बाफ पेटवायची इच्छा दिसतेय, तेव्हा त्यांनी या विषयासाठी नवा बाफ उघडावा. माझ्या बाफचा विषय दोन दूरवरच्या संस्कृतींचा परस्परसंबंध हा आणि हाच आहे. कृपया आर्य वाद दुसरीकडे खेळा.

बाकी सर्वांना धन्यवाद. फार नाही तरी थोडाफार तपशील या लेखात निश्चितच टाकेन, पण जरा दम धरा

वरदा + १०००

आर्य अनार्य ते कधी आले त्यानी काय केले हा मुद्दा इथे गैर्लागू आहे. सिंधू संस्कृतीच्या ह्रासासाठी कोणतेही बाहेरचे आक्रमण जबाबदार आहे ह्याचा कोणताही पुरावा मिळालेला नाही. तेंव्हा आर्यांचे आक्रमण वा मायग्रेशन हा मुद्दा कृपया इथे आणु नये.

येऊकामी ... वरदा ही पेश्याने पुरातत्व अभ्यासते. पुरावा जर असे सांगत असता की सिंधू संस्कृतीच्या ह्रासासाठी बाहेरचे आक्रमक जबाबदार होते व ते आक्रमक अर्य असल्याच्व्हे पुरावे आहेत तर ते लिहिणे तिने टाळले नसते. काय घडले कसे घडले व कधी घडले ह्याचे चित्र उलगडण्याचे तिचे काम आहे. सत्य शोधन करताना राजकारण करणे हे नाही. तेंव्हा तिला हिंदुत्वादी वगैरे नाव ठेवण्याचे कहीही कारण नाही.

वरदा माझा प्रष्ण असा आहे की नागरीकरण लयास गेले असे मानले तर इतिहास काळात जी नगर रचना दिसते अगदी अत्ताअता पर्यंत गावातून देखील जी घरांची बांधणी वा नगर रचना दिसते त्यात सिंधू संस्कृतिच्या नगर रचनेचे ठसे दिसतातच...

तसेच देवळांच्या (विशेषतः) दक्षीणे कडिल देवळांच्या रचनेत पुष्करणी, कुंभ हा थे ग्रेट बाथ चा वशंज दिसतोच जर नागरीकरण लोप पावले असे म्हटले तर हे नंतरचे ठसे कसे? ह्याचे काय एक्स्प्लेनेशन?

 
 
 
Ancient Indian Highways - Dakshinapatha
Dakshinapatha was an important ancient trade route of India like Uttarapatha. Dakshinapatha linked northern towns with those in south. In Buddhist literature the Dakkhinaptaha goes from north to south as follows: Sravasti > Prayag > Vidisha > Ujjaini > Mahismati > Patistthana. Dakkhinapatha has also been referred to as 'southern region' or 'Janapada' through which this highway passed.



Map showing India in 600 BCE taken from Samyukt Nikaya in Hindi translated by Bhikhu Dharmrakshit and Bhikhu Jagdish Kashyap published in 1954. The map shows five regions - Uttarapatha, Madhaydesa, Aprantaka, Pashchadesa and Dakshinapatha 

The word Dakshinapatha is made up of two Sanskrit words दक्षिण+पथ for south+road and is written as दक्षिणापथ: or दक्षिणपथ. Buddhist literature in Pali mentions it as Dakkhinaapatha or दक्खिनापथ indicating both 'south road' and 'south region'. 
Earlier the area between Ganga and Godavari was generally being called as Dakshinapatha. Later around first and second century CE Dakshinapatha got extended to include extreme south like present day Tamilnadu and Kerala also. 

In Sabha Parva of Mahabharat ( Book II Chapter 28 Section xxx English version) it is mentioned that '..... thus Sahdeva marched towards the southern direction and subjugated and extracted tributes from the Paundrayas, the Dravidas, the Udrakeralas, the Andhras, the Talavanas, the Kalingas, and the Ushtrakarnikas'. 

Buddhist Pali language literature Samyukta Nikaya mentions an ascetic named Bavari ( बावरी ) who went from Magadh to the banks of Godavari and established a monastery in between kingdoms of Assaka and Alaka. Later sixteen students of Bavari met Buddha ( 563-483 BCE ) and asked questions on the goal of his teachings and how to attain the goal. Recent archaeological researches link a ancient brick mound at Bavapur Kurru in Telangana to Bavari. 

As mentioned in Sutta Nipata Book 5 'Parayana-Vagga' the sixteen disciples of sage Bavari went to meet Buddha via the following route:




Excerpts from Sutta Nipata translated by Lord Chalmers published in 1932 by Oxford University Press London


Kingdom of Avanti is mentioned in some places as Avantidakkhinapatha or Dakkhinupathe Avantirattha. In another book Sumangala Vilasini  Dakkhinapatha is said to be a Janapad south of Ganga - Gangaya dakkhinato pakatajanapadam. 

In Cullavagga, Khandaka Dakkhinapath has a reference in a story ..... Long ago Sir, certain merchants of Dakkhinapatha went, for the sake of their traffic, to the country of east..... Another story of Sona Kutukanna appears in Vinay Pitaka in which venerable Bhikhu Katyayana is mentioned as Mahakaccana ( of ) Avantidakkhinapatha. 



Uttarapatha in thick black line from Rajguha to Takshashila and Dakshinapatha in yellow line from Sravasti to Pratishthana via Prayag, Vidisha and Ujjaini
Apparently the Dakshinapatha existed and was known to traders much earlier than 8th or 7th century BCE. There were smaller link routes also which connected hinterland to Dakshinapatha. Important among these was connecting route to Bharukachcha port presently known as Bharuch on Gujrat coast. Bharukachcha opened avenues of trade via this sea link to western Asia. 

Vedic texts divide Indian sub-continent in 3 parts Aryavarta, Madhya Desha and Dakshinapatha. Panini ( approx 500 BCE ) in his work Ashtadhyayi mentions kingdoms of Kalinga, Asmaka and Dakshinapatha. Satvahanas ( late 2nd century BCE to early 3rd century CE ) were called as Lords of Dakshinapatha. 

Dakshinapatha finds mention in Greek 'periplus' also. Periplus is voyage around an island or an account of such circumnavigation. First century CE book 'Periplus of the Erythraean Sea' also mentions routes of trade and merchandise to be traded with including Dakshinapatha. A sketch of a map is as under. 


Map of the 'Periplus of the Erythraean Sea' from Wikipedia, written sometime in 1st CE. Showing trade routes and merchandise available for trading at different places. Dakshinapatha is mentioned here as Dakinabades, Bharukachcha as Barigaza, Ujjaini as Ozene, Paithan as Paethan etc. 
Over a period of time, many changes in the route took place. Our modern National Highways NH 44, NH 30, NH 34 and NH 35 partially cover, touch or cross the ancient Dakshinpatha.



For further reading: 1. Geography of early Buddhism by B. C. Law, 2. A History of Pali Literature by B. C. Law and 3. Early Buddhist Transmission and Trade Networks by Jason Neelis.

 Ancient Indian Highways - Uttarapatha
In ancient times Indian sub-continent had couple of highways which facilitated trading, exchange of goods and ideas. Two such highways were called as Uttarapatha and Dakshinapatha. Uttarapatha connected shores of Bay of Bengal to the plains of northern India and to the mountains of Afghanistan. Dakshinapatha connected Shravasti and Varanasi to south via Prayagraj, Vidisha, Ujjain to Paithan or Pratishthan in Maharasthra. 

In this write-up is about Uttarapatha and Dakshinaptha shall be taken up in next part later on.

2. The name Uttarapatha is derived from Sanskrit words Uttara meaning north and Patha meaning way / road and is variously written as: उत्तर पथ, उत्तरापथ: and उत्तरापथा. This Uttarapatha connected eastern coastal town Tamluk, West Bengal to Varanasi to Hastinapur to Sanghol to Takshshila. From there it had links to Chinese Silk Route. In between Tamluk and Taxila, there were many shorter link roads from Uttarapatha highway to nearby towns in hinterland which helped in trading and exchange of goods. 


'Pathas' have been mentioned in Atharva Veda in Chapter XXI - Prithvi Sukta or Hymn to Goddess Earth Verse 47. It says - Thy many pathas upon which many people go, thy tracks for chariots and wagons to advance, upon which both good and evil men proceed, this road free from enemies, free from thieves, may we gain: with what is auspicious ( on thee ) be gracious to us!

3. Uttarapatha has also been referred to as northern region or northern area in many Puranas and Buddhist texts. Boundaries of this region however, are not clearly defined. Broadly the Uttarapatha region comprised of area between Himalayas in north including Punjab, north-west of Pakistan and parts of Afghanistan. Historically the Uttarapatha began in about 6th or 5th century BCE and continues even today with variations here and there due to geopolitics and change in regimes. This region Uttarapatha as per Buddhist texts included Gandhara and Komboja Janapadas which were two of the sixteen Janapadas mentioned in Buddhist literature. Names of towns like Taxila, Kashmir, Peshawar and Sagal ( present day Sialkot ) gets frequent mention.  


India during times of Buddha. Map taken from the Samyukta Nikaya by Bhikhu Dharmrakshit and Bhikhu Jagdish Kashyap in Hindi published in 1954. Uttarapatha during 6th to 4th century BCE, ran from Rajguha ( modern Rajgir in Bihar ) to Sravasti to Hastinapur and to Takshshila.  

4. Ancient India:  The Uttarapatha connected Balkh in Afghanistan to Tamraliptika ( present day Tamluk in West Bengal ) during 4th to 2nd century BCE, This was the period when Maurya dynasty ruled. This highway has many Buddhist archaeological remains like stupa, chaitya, viharas, rock edicts and pillars of Emperor Ashoka. Presence of coins and earthenware also indicates the trading route. The Seventh Ashokan Pillar (The Delhi-Topra Pillar now in the fortress known as Feroz Shah Kotla, New Delhi ), refers to royal road lined with fruit trees, wells, rest houses at regular intervals. The Uttarapatha also connected Takshshila university to Mauryan capital Pataliputra with further links to Nalanda and Vikramshila universities. 

Till 5th century CE this route was in frequent use by horse traders of central Asia and was also called as the Route of Horse Traders. In the Buddhist literature 'Jataka Tales' translated from Pali by Robert Chalmers and published in 1895, there is a reference regarding Uttarapatha in 'Jataka 5 - Tandulanali-jataka' as under: 'Once on a time Brahmdatta was reigning in Kasi..... At that time there arrived horse-trader from Uttarapatha with 500 horses'. 

Greek diplomat Megasthenes is said to have stayed in Mauryan court for about 15 years. He was an ambassador of Indo-Greek king Seleucus Nicator. His exact dates of stay are not known but are presumed to be during the reign of Seleucus Nicator which is 305- 281 BCE. He has told in his book 'Indica' about an army of people supervising, securing Uttaraptha and collecting taxes on this road from Patliputra to Purushpura (now Peshawar). 

Another interesting fact of cultural and religious exchange is presence of ambassador Heliodorus in Vidisha, Madhya Pradesh, deputed by Indo-Greek king Antialcidas Nikephoros approximate reign 115 - 95 BCE. Heliodorus became a Vaishnavite and constructed a Vishnu temple in Vidisha. This temple is no more but a stone pillar - Garuda Dhwaja, with inscriptions survives. 


6.5 meter high stone pillar Garud Dhwaja erected by Greek Ambassador Heliodoros in Vidisha, M.P. Said to have been constructed in 113 BCE

Chinese travellers Fa Hian and Hiuen Tsang also used almost the same route to visit Nalanda university in search of Buddhist literature and in particular the Vinaya Pitaka. 

International merchants Tapassu and Bhalliya ( spelt differently in various texts as Trapussa and Bahalika, Taphussa and Bhallika ) travelled frequently on Uttarapatha. While travelling they met Lord Buddha ( 563-483 BCE ) who was on his way to Rajgir. Merchant brothers offered food to Buddha and they had a talk. Merchants were impressed and requested Buddha to give them something by which they could remember and honour him in his absence. Buddha scraped his head and gave them eight strands of his hair. They made a golden casket later and put the hair as relic in the casket. Sri Lankan chronicles describe that this relic was placed in stupa on top of mountain called Girihandu Seya. The Burmese tradition mentions that merchant brothers travelled to Burma and enshrined the casket in Shwedagon Pagoda. 

Another reference to Uttarapatha is found in the book 'Blue Annals' ( deb-thor sngon po ) translated by George N. Roerich from Tibetan and published in 1949. There it is mentioned that: 'About that time, a king from the country of Uttarapatha named Kaniska visited Kasmir to meet Simha. Arya Simha preached to him Doctrine( of Buddha ).' 

Uttarapatha is mentioned in chapter XIX of Skanda Purana also. Extract from translation by G.V.Tagare published in 1950 is as follows: 'At the outset in the Svayambhuva Manavantara in the fourth Tretayuga the sages proceeding towards Uttarapatha gathered together.'

An eminent Buddhist monk and teacher Maha Kapphina Thera ( Maha Kappina / Maha Kopphino ) is mentioned as hailing from Uttarapatha.

Emperor Ashoka had sent nine groups of Buddhist monks to various parts of the world which included (i) a group headed by Majjhantika to Kashmir and Kandahar, (ii) a group led by Maharakhita to Land of Yonas ( the Greeks ) and (iii) a group led by Majjhima to Himalayan areas. These groups travelled by Uttarapatha.

5. Medieval India: The Uttarapatha route and the region in general, became prosperous because of increased trading and attracted invaders as well. After the reign of king Harshvardhana ( 606 - 647 CE ) northern India was split in many smaller kingdoms occasionally fighting with each other thereby weakening themselves. Invaders took advantage of the situation and used Uttarapatha route to win over the northern parts of India. 

During the reign of Sur dynasty ( 1540-1556 CE ) Uttarapatha became Sadak-e-Sher Shah or Rah-e-Shah. Sher Shah Suri is credited with reconstructing this highway.  Initially he connected his hometown Sasaram in Bihar to his capital Agra which was later extended at both ends to Kabul in the west and to Sonargaon in Bangladesh in the east. He made sarais, water bodies and kos minars along the route and planted trees. This served as important symbol of sovereignty but this also had positive impact on trade and exchange of goods along the Sadak. 



The milestone called Kos Minar on Grand Trunk Road near Ambala
During 1555 to 1707 CE, the Mughals refurbished the route. Mughals enhanced the use of this road as a tool of administration also. Akbar ( 1556 -1605 CE ) and Jahangir ( 1605-1627 CE ) allowed landlords to construct and run sarais and to settle people close to sarais. 

5. British Raj: As the Mughals slowly weakened and went down the British East India Company stepped in. In order to improve administration and communication British administrators thought of making trunk roads or cross country roads to connect ports to major cities. In 1830 East India Company started making metalled roads for commercial and administrative purposes. A section of Grand Trunk Road between Ambala to Karnal was opened in 1856. This road helped East India Company to rush troops to Delhi against the 'mutineers' in 1857 thereby securing their foothold. Eventually the Badshahi Sadak became Grand Trunk Road connecting Kolkata to Kabul via Delhi. 

Interesting to note that Rudyard Kipling mentions this road as 'a river from which I am withdrawn like a log after flood. And truly the Grand Trunk Road is a wonderful spectacle. It runs straight bearing without crowding India's traffic for fifteen hundred miles - such a river of life as nowhere else exists in the world.'

6. Modern India: From ancient Uttarapatha to Sadak-e-Shah to Badshahi-Sadak to Grand Trunk Road we have come to modern National Highways. As at present a combination of following 3 National highways connects east coast to western border like ancient Uttarapatha did:

 NH 19: Dankuni ( West Bengal ) > Dhanbad >Varanasi > Kanpur > New Delhi,

 NH 44: New Delhi > Sonipat > Ambala > Jalandhar and

  NH 03: Jalandhar > Amritsar > Attari. 

  


Map from Swarajya magazine showing Uttarapatha from Rajgir to Taxila and Dakshinapatha from Shravasti to Ujjain to Pratishthan ( modern Paithan, Maharshtra ). 


ashwinchitale.home.blog
Megasthanes आणि Indika
by Ashwin Chitale
18–23 minutes
…मागच्याच महिन्यात Canada वरून आलेल्या काही Student-पर्यटकांबरोबर “गाईड” म्हणून कार्ले-भाजे-बेडसे लेण्यांना गेलो होतो. तेव्हा या लोकांच्या भारताबद्दलच्या कल्पना ऐकून आश्चर्य वाटले.

“Keith” नावाचा त्यांचा एक लीडर होता तो मला येऊन म्हणाला:
“भारताबद्दल आम्ही जे imagine केलं होतं त्यापेक्षा हा देश फारच वेगळा आहे, आम्हाला येताना वाटलं की भारतात जागोजागी साधू-संत आणि गाई-म्हशी बसलेल्या असतील आणि योगी ऋषी वगरे उलटे हातावर उभे असतील, आणि आयुष्याच्या तत्त्वज्ञानाबद्दल काहीतरी डेंजर सल्ले देतील”

पहिल्यांदा त्याच्या या वाक्यांवर हसायलाच आलं. एकतर त्यांनी “साधू-संत” आणि “गाई-म्हशीं”ची तुलना केली. दुसरं म्हणजे माझ्या हे लक्षात आलं की एखाद्या देशाबद्दल किंवा प्रांताबद्दल एखादयाच्या मनात किती वेगळे विचार असू शकतात.

मी त्याला म्हणलं:
“गाई-म्हशी आहेत अजून.. साधू-संत तेवढे दिसत नाहीत सध्या.. हां बाकी आयुष्याचं तत्त्वज्ञान सांगणारे (पाजाळणारे) भरपूर मिळतील” (hopefully Keith भाऊंना यातला विनोद कळला असावा).

मात्र यामुळे मी विचार करायला लागलो की भारतात पहिल्यांदा जे कोणी व्यापारी, प्रवासी, राजे आले असतील त्यांनी भारताबद्दल काय ऐकलं असेल? त्यांच्या मनात भारताबद्दल कशी “image” असेल? आणि त्यांना इथे आल्यावर काय वाटलं असेल?

सगळ्यात पहिल्यांदा Alexander डोळ्यासमोर आला पण त्याच्याबरोबर आलेल्या इतिहासकारांचा मुख्य मुद्दा “Alexander” असल्यामुळे त्यांचा विषय सोडून दिला. मग आला तो Megasthanes. या व्यक्तीबद्दल ऐकीव माहिती खूप होती. Indology च्या अभ्यासक्रमात पण साहेब भेटले होते पण प्रत्यक्ष संबंध आला नव्हता. तेव्हाच ठरवलं की Megasthanes आणि त्याचं Indica यावर blog लिहावा.

सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे Indika हा ग्रंथ आज अस्तित्त्वात नाही. याचे कुठेही हस्तलिखित सापडलेले नाही. मात्र Megasthanes नंतर भारतात आलेल्या Arrian, Diodorus, Strabo, Pliny यांसारख्या अनेक इतिहासकार-प्रवाश्यांनी या Indika बद्दल लिहून ठेवले आहे आणि यातूनच मुळ Indika चे तुकडे (Fragments) गोळा करून John Watson McCrindle यांनी 1887 साली Indika चे “reconstruction” केले.


मी या लेखातील सर्व माहिती McCrindle यांच्याच “Ancient India as Described by Megasthanes and Arrian” या पुस्तकातून घेतली आहे. या Indika मध्ये लिहिलेल्या सर्व गोष्टींची पडताळणी अभ्यासकांनी करुन पाहिली त्यातल्या अनेक गोष्टींचा अर्थ समजतो (जुनी शहरे, काही जमाती किंवा त्याने सांगितलेली वर्णव्यवस्था) पण काहींचा मात्र अजिबात पत्ता लागत नाही.

Alexander जेव्हा परतला तेव्हा त्यानी भारतात अनेक “सत्रप” म्हणजेच officers ची नेमणूक केली होती त्यापैकी Selucus Nikator हा एक. Megasthanes हा Seleucus Nikator चा राजदूत. चंद्रगुप्त मौर्यानी नंद राजांचा पराभव करून स्वतःचे राज्य निर्माण केल्यावर या Seleucus ने चंद्रगुप्ताच्या राज्यावर हल्ला केला. हे युद्ध ख्रिस्तपूर्व चौथ्या शतकाच्या सुमारास झाले (इ.स.पु. ३१०-३०५ दरम्यान). या युद्धात चंद्रगुप्ताचा विजय झाला आणि बदल्यात Seleucus नी त्याच्या मुलीचे – Helena चे – लग्न चन्द्रगुप्ताबरोबर लाऊन दिले. यानंतर याचा दूत Megasthanes Arachosia (सध्याच्या अफगाणिस्तानचा हेलमंड प्रांत) इथून पाटलीपुत्र ला गेला हा प्रवास करताना त्यांनी जे अनुभवले ते त्यांनी या Indika मध्ये लिहिले आहे.




भारताचा भूगोल

सर्वप्रथम भारताच्या आकाराविषयी सांगताना मेगास्थानीस म्हणतो की भारताचा आकार चौकोनी आहे. भारताच्या पूर्वेला आणि पश्चिमेला समुद्र आहे उत्तरेला Hemodos (हिमाद्री / हिमालय) आहे आणि त्याला लागुनच Scythian लोकांचा प्रदेश आहे ज्यांना भारतातले लोक Sakai (शक) असे संबोधतात.

भारताच्या पश्चिमेला Indus (सिंधू) नदी वाहते जी बहुतेक Nile (नाईल) नंतर जगातली सर्वात मोठी नदी असावी.
भारताच्या विस्ताराविषयी बोलताना Megasthanes सांगतो की भारत हा पूर्व – पश्चिम २८,००० Stadia आणि उत्तर – दक्षिण ३२,००० Stadia आहे. Stadia हे अंतर मोजायचे एक माप आहे, Stadia हा शब्द Stadion शब्दाचे बहुवचन आहे. यावरूनच Stadium हा शब्द आला आहे. एक Stadion किंवा Stadium म्हणजे साधारणपणे 185 मीटर्स. म्हणजेच भारताचा विस्तार हा Megasthanes च्या मते पूर्व-पश्चिम 51,80,000 मीटर्स आणि दक्षिणोत्तर 59,20,000 मीटर्स इतका आहे.

भारतात आकारानी मोठ्या अनेक नद्या आहेत ज्यांचा उपयोग वाहतुकीसाठी केला जातो. यातल्या बहुतेक नद्यांचा उगम उत्तरेला पसरलेल्या मोठ्या पर्वतरांगांमध्ये होतो. यातल्या बहुतेक नद्या शेवटी जाऊन एका मोठ्या नदीस मिळतात तिचे नाव Ganges (गंगा). ही नदी उत्तरेकडून दक्षिणेकडे वाहते आणि तिच्या स्त्रोतापाशी ती ४० Stadia (7,400 मीटर्स) इतकी मोठी आहे. या Ganges सारखीच दुसरी मोठी नदी म्हणजे Indus ही नदीदेखील Ganges प्रमाणे दक्षिणवाहिनी आहे आणि या दोन नद्यांनी एक प्रकारे भारताच्या सीमा तयार केल्या आहेत. या Indus नदीला खूप उपनद्या आहेत त्यातील महत्त्वाच्या म्हणजे Hyphasis (विपाशा म्हणजे बियास), Hydaspes (वितस्ता म्हणजे झेलम) आणि Akesines (असिक्नी म्हणजेच चिनाब). येथील तत्त्वज्ञ आणि अभ्यासक सांगतात की भारत देशाभोवती असलेले Bactria आणि Scythia सारखे देश भारतापेक्षा उंचीवर आहेत आणि त्यामुळेच तेथे उगम पावणाऱ्या नद्यांचे पाणी निसर्गतः वाहून भारतात येते. भारतातल्या लोकांना दुष्काळ किंवा अन्नधान्याचा तुटवडा म्हणजे काय हे माहितच नसावे

भारतीय लोक

भारतात शेतकरी लोकांना आणि गुराखी-मेंढपाळांना विशेष महत्त्व आहे. भारतातले लोक लढाई करताना देखील या शेतकरी आणि गुराख्यांचे नुकसान होणार नाही याची काळजी घेतात. त्यामुळेच देशांतर्गत लढायांमध्ये सुद्धा जमिनीची किंवा शेतीची नासधूस किंवा झाडे पाडणे हे प्रकार होत नाहीत.

भारतात अनेक प्रकारचे: पंथांचे, जातीचे लोक एकत्र राहतात यातले कोणीही बाहेरचे असण्याची शक्यता वाटत नाही तर हे सर्व प्राचीन काळापासून इथेच राहत असावेत. भारतावर आत्तापर्यंत कोणाचेही आक्रमण झाले नाही आणि भारतातल्या लोकांनी कधीही कोणावर आक्रमण केले नाही.

इथली लोकं पूर्वीच्या काळी ग्रीकांसारखेच प्राण्याच्या कातड्यापासून बनवलेले कपडे घालत होते आणि निसर्गतः उपलब्ध असणाऱ्या अन्नावर अवलंबून होते. मग पुढे काळाच्या ओघात कला आणि शास्त्रांचा विकास झाला.

भारतातल्या लोकांमध्ये ७ वर्ग आहेत:

पहिल्या वर्गात तत्त्ववेत्ते आणि ज्ञानी लोकांचा समवेश आहे जे संख्येने इतर वर्गांच्या तुलनेत कमी आहेत पण बुद्धिमत्तेत सर्वांना वरचढ आहेत. हे लोक कोणाचेही मालक नाहीत अथवा गुलाम देखील नाहीत ते लोकांच्या भिक्षेवर जगतात लोक त्यांना देवाच्या सर्वात जवळचे मानतात. यातले काही लोक भविष्यवेत्ते, आणि ज्योतिषी आहेत जे वर्षाच्या सुरुवातीला पर्जन्य, दुष्काळ इत्यादीचा अंदाज वर्तवतात.

दुसरा वर्ग हा शेतकऱ्यांचा आहे. या वर्गातील लोकांची संख्या सर्वांत जास्त आहे. कुठलेही आक्रमण झाले तरी ह्या वर्गाला कधी कोणी इजा करत नाही त्यांना दानी समजले जाते त्यामुळेच त्यांना सर्व प्रकारचे संरक्षण दिले जाते. हे शेतकरी त्यांच्या कुटुंबासह शहरी भागात न राहता ग्रामीण भागात राहतात. ते राजाला कर देतात कारण शेती ही राजाची मालमत्ता आहे त्यामुळेच कुठल्याही माणसाला जमिनीचा मालक व्हायचा अधिकार नाही. या कराव्यतिरिक्त त्यांना शेतीतून तयार झालेल्या धान्याच्या रकमेचा एक-चतुर्थांश भाग हा राजाला द्यावा लागतो.

तिसरा वर्ग हा मेंढपाळांचा आणि गुराख्यांचा आहे. हे लोक शहरात किंवा गावात न राहता स्वतःच्या झोपड्यांमध्ये राहतात. हे लोक वन्य प्राण्यांची आणि पक्ष्यांची शिकार करून उदरनिर्वाह करतात.

चौथा वर्ग कारागिरांचा आहे. यातील काही शस्त्र बनवणारे आहेत. बाकीचे दैनंदिन आयुष्यात लागणाऱ्या अवजारांची आणि भांड्यांची निर्मिती करतात. यांना कोणताही कर द्यावा लागत नाही तर राजाकडून यांना देखभालीचा खर्च दिला जातो.

पाचव्या वर्गात सैनिकांचा समावेश होतो. हे लोक शस्त्र बरोबर ठेवतात. यातल्या काहींकडे सेनेतल्या घोड्यांची, हत्तींची जबाबदारी असते. हे लोक संख्येनी शेतकर्यांच्या नंतर सर्वांत जास्त आहेत. यांच्या उदरनिर्वाहाची सर्व जबाबदारी राजावर असते.

सहाव्या वर्गात राजाच्या अधिकाऱ्यांचा समावेश होतो. राज्यातील लोकांची परिस्थिती आणि हालहवाल राजाल सांगणे, लोकांच्या समस्या राजापर्यंत पोहोचवणे यासाठी यांना नियुक्त केले जाते.

सातव्या वर्गात राजाच्या सल्लागारांचा समावेश होतो. हे लोक राजाला राज्याच्या धोरणाबद्दल सल्ले देतात. संख्येने हे सर्वात कमी आहेत, पण यांना समाजात सर्वात जास्त मान आहे.

भारतातील लोक स्वतःचा वर्ण (ब्राह्मण/क्षत्रिय या अर्थी) सोडून विवाह करत नाहीत. भारतातील काही अधिकारी परदेशी लोकांची सेवा करतात. त्यांना हवे ते सर्व मिळेल याची खात्री करतात तसेच कोणी परदेशी व्यापारी/प्रवासी आजारी पडल्यास ते वैद्य नेमून देतात आणि मृत्यू पावल्यास दफन करतात.

भारतात सर्व लोक स्वतंत्र आहेत आणि गुलामांची पद्धत भारतात रूढ नाही असे दिसते.

भारतातले लोक खूप काटकसरी जीवन जगतात. भारतीयांचा एक असा कोणताही कायदा किंवा नियम नाही असे असूनही Palibothros सारख्या शहरामध्ये चोरीची संख्या अत्यल्प आहे.

भारतातली लोक फक्त यज्ञाच्या वेळी मद्यपान करतात हे मद्य तांदळापासून बनवलेले आहे. हे लोक न्याय मागायला राजदरबारात सहसा जात नाहीत. त्यांना व्यापारी किंवा जमिनीच्या आणि अन्य करारासाठी कोणत्याही साक्षीदाराची किंवा कोणत्याही मुद्रेची गरज लागत नाही. कुठल्याही प्रकारचे संरक्षण नसताना हे लोक घर उघडे ठेऊन घराबाहेर पडतात.

भारतीयांची खाण्याची एक वेळ नाही, ते त्यांना वेळ मिळेल तसे खातात.

राजाच्या संरक्षणाची जबाबदारी त्याच्या अंगरक्षक स्त्रियांकडे असते. राजा दिवसा झोपत नाही आणि रात्रीच्यावेळी देखील घातपात टाळण्यासाठी आपल्या शयनाची जागा बदलतो. राजा यज्ञासाठी, न्यायनिवाड्यासाठी, शिकारीसाठी आणि युद्धासाठी बाहेर पडतो इतर वेळेस महालात राहतो त्याच्या दूतांकडून तो राज्यात चाललेल्या घडामोडींची माहिती घेत राहतो.

भारतीयांना व्याज या संकल्पनेबद्दल माहित नाही ते एकमेकांकडून क्वचितच कर्ज मागतात. कर्ज घेणाऱ्याने ते परत फेडले नाही तर याची सर्वस्वी जबाबदारी त्या कर्ज देणाऱ्यावर असते की त्याने कर्ज फेडायला अपात्र व्यक्तीला ते दिले याबाबत राज्य कोणताही हस्तक्षेप करत नाही.

जमीनीप्रमाणेच सामान्य नागरिकाला घोडा किंवा हत्ती पाळण्याची अथवा ठेवण्याची परवानगी नसते. हे प्राणी राजाची खास मालमत्ता म्हणून गृहीत धरले जातात. भारतीय हत्तींना माणसाळवणे हे खूप अवघड असते. हत्ती पकडून त्यांना गायन करून आणि वाद्य वाजवून पाळले जाते आणि पुढे युद्धाचे प्रशिक्षण दिले जाते. हे करताना चार तंतू असलेले एक Skindapsos नावाचे वाद्य वाजवले जाते. घोड्याला सहा वर्षाचा असल्यापासूनच प्रशिक्षण दिले जाते. बरेचदा त्यांना दुधाने अंघोळ घातली जाते आणि त्यांच्या शरीराच्या जखमांवर डुकराचे मांस आणि तेल लावून त्यांच्यावर उपचार केले जातात.

भारतीय जमाती

भारतातली एक जमात Scyritae म्हणून ओळखली जाते. या टोळीतील माणसांची उंची 3 Span एवढीच असते (1 Span म्हणजे 9 ईंच) या जमातीतल्या काही लोकांना नाकच नाही तर त्याजागी फक्त नाकपुडी सारखी दोन छिद्र आहेत ज्याद्वारे ते श्वास घेतात. यांचे पाय सापासारखे दिसतात.

MULO नावाच्या एका पर्वतावर एक टोळी राहते ज्यांचे पाय उलटे आहेत आणि एक पायाला आठ बोटे आहेत.

तर काही पर्वतांवर राहणाऱ्य जमातीतील लोकांचे शीर कुत्र्याचे आहे जे वन्य प्राण्यांचे कातडे अंगावर पांघरतात आणि कुत्र्यांच्या भाषेत बोलतात.

Ganges नदीच्या स्त्रोतापाशी एक Astomi नावाची जमात राहते ज्यांना तोंडच नाही. हे लोक अन्न-पाण्यावाचून फक्त श्वासावर जगत आहेत. ते स्वतःबरोबर सुवासिक फळे फुले ठेवतात आणि त्या वासावरच ते जगतात.

या जमातींचा सध्याच्या काळात काही पत्ता लागलेला नाही. काही जणांच्या मतानुसार हे Astomi म्हणजे हिमालयातले योगी साधू असावेत पण हे मत सर्वमान्य नाही.

भारतीय तत्त्वज्ञ

भारतीय समाजात दोन प्रकारचे ज्ञानी आढळतात Brachmana आणि Sarmanes. (ब्राह्मण आणि श्रमण वर्ग)

यातले Brachmana भारतीयांना जास्त आदरणीय आहेत. हे Brachmana लोक लहानपणापसून एखाद्या गुरूकडे शिकायला जातात आणि शिक्षण झाल्यावर स्वगृही परततात. यांचे आयुष्याबद्दलचे आणि जगाबद्दलचे तत्त्वज्ञान विलक्षण आहे. काही मुद्द्यांवर ते एकमेकांशी वाद पण घालतात. काही तत्त्वज्ञानी लोकांचे मत असे आहे की या सृष्टीला आदी आणि अंत आहे आणि सृष्टी एका मोठ्या गर्भात आहे आणि सृष्टीच्या निर्मात्याचा अंश सृष्टीच्या प्रत्येक गोष्टीत आहे. काही जल हे या सृष्टीच्या उत्पत्तीचे कारण सांगतात. चार मुख्य तत्त्वांबरोबरच काही लोक एका पाचव्या तत्त्वालाही मानतात ज्याद्वारे स्वर्ग आणि ताऱ्यांची निर्मिती झाली असे म्हणतात. ते ग्रीकांसारखेच पृथ्वीला ब्रह्मांडाच्या मध्यभागी मानतात आणि यांची आत्म्याविषयीचे विचार ग्रीकांसारखेच आहेत.

दुसरा वर्ग Sarmanes लोकांचा आहे. यातील सर्वात आदरणीय व्यक्तीला Hylobioi म्हणले जाते. हे लोक वनांत राहतात आणि निसर्गतः उपलब्ध अन्नावर जगतात. हे लोक क्वचित राजाला अध्यात्मिक मार्गदर्शन करतात आणि स्वतः मिथुन आणि मद्य यापासून लांब राहतात. यांच्याकडे असलेल्या शक्तीद्वारे हे लोक रोग बरे करतात. स्वतःच्या शरीराला यातना देऊन हे लोक स्वतःला भौतिक जगासून परावृत्त करतात.
या ऋषींना हे ग्रीक लोक “Gymnosophist” म्हणत. “Gymno” किंवा “Gym” म्हणजे नग्न आणि “Sophist” म्हणजे थोडक्यात ज्यांना नग्न राहायला आवडते असे लोक.

अश्याच एका Dandamis नावाच्या ऋषीची आणि Alexander ची गोष्ट या ग्रीक प्रवाशांच्या प्रवासवर्णनात येते.

“Porus” म्हणजेच पुरू राजाला हरवल्यानंतर तिथल्या प्रदेशातल्या वनांत राहणाऱ्या ऋषींना, संन्यासी मुनींना Alexander ने भेटायची इच्छा व्यक्त केली. त्याने त्याचा Onesicritus नावाच्या दुताला ऋषींना निरोप कळवण्यासाठी पाठवले. Onesicritus वनांतून जात असता त्याला एका झाडाच्या पारावर पाचोळ्यात झोपलेला एक संन्यासी दिसला.

Onesicritus त्याच्याजवळ जाऊन म्हणाला,

“Jupiter पुत्र, सर्व मानवांचा स्वामी, सृष्टीचा मालक, महान परमेश्वर Alexander ने तुला भेटायची इच्छा व्यक्त केली आहे. तेव्हा तू उठ आणि माझ्यासोबत ये. असे केल्यास तुला माझा राजा अमाप संपत्ती आणि भेटी देईल पण नकार दिल्यास तुझा शिरच्छेद करण्यात येईल”

Dandamis ने न हलता उत्तर दिले:

“माझा देव प्रकाश देणारा आहे, शांती आणि जलप्राप्ती करून देतो माझा स्वामी तोच आहे जो आत्म्यांचा आणि प्राणांचा निर्माता आहे. विध्वंस करणरा माझा देव असूच शकत नाही. माझा कर्ता तोच आहे, जो हत्येचा आणि युद्धाचा तिरस्कार करतो आणि जो जन्म आणि मृत्यू पासून मुक्त आहे त्यामुळेच तुझा हा अलेक्झांडर माझा देव नाही कारण एखाद्या सर्वसामान्य माणसाप्रमाणे त्यालाही एक दिवस मरण येणार आहे आणि राहिली गोष्ट सर्व जगाचा स्वामी असल्याची, तर तुझ्या या देवाच्या रूपातल्या राजाला अजून Tiberboas (बियास नदी) पण ओलांडता आली नाही. जगात अशी अनेक राज्य आहेत ज्यांना तुझ्या या देवाचे नाव पण माहित नसेल. जगातली कुठलीही बक्षिसी, दान, आणि संपत्ती माझ्यासाठी नगण्य आहे. मी ज्याला माझी संपत्ती मानतो ती हे माझी पाने ज्यावर मी झोपलो आहे. ही झाडे जी रोज मला अन्न देतात, हे जल जे माझी तहान भागवते. माझ्याकडे असे काहीच नाही ज्याचे मला संरक्षण करावे लागते माझी भूमाता माझ्या गरजा जाणून आहे. मी मला हवे त्या ठिकाणी संचार करू शकतो आणि त्यासाठी तुझा देव मला अडवू शकत नाही माझे शीर धडावेगळे केले तरी माझ्या आत्म्याला तुझा देव हात सुद्धा लाऊ शकत नाही. माझे प्राण गेले तर उलट मी माझ्या परमात्म्याशी एकरूप होईन ज्याने मला या देहरूपी कपड्यांत निर्मिले. जा जाऊन सांग तुझ्या राजाला की हे संपत्तीचं आमिष आणि मृत्युचं भय त्यांना दाखव जे संपत्तीची इच्छा करतात आणि मृत्यूला घाबरतात. तुझ्या सर्वशक्तिमान झुसपुत्र अलेक्झांडरकडे असं काहीच नाही की जे तो मला देऊ शकेल किंवा माझ्याकडून काही हिरावून घेऊ शकेल सांग तुझ्या राजाला की या दान्दामीसला त्याच्याकडचे काही नको त्याला माझ्याकडचे काही हवे असेल तर त्यानेच मला येऊन भेटावे.”

असे म्हणतात की, हे सर्व ऐकल्यावर Alexander म्हणाला, “मी एवढे प्रदेश जिंकलो इतक्या राजांना हरवलं पण मला या एका नग्न ऋषीमुळे हरल्यासारखे वाटत आहे.”

पुढे Alexander त्याला भेटायला गेल्यावर Dandamis ने Alexander ला विचारले की हे जग जिंकल्यावर तू काय करणार आहेस? आणि असे म्हणतात की Alexander कडे या प्रश्नाचे उत्तरच नव्हते.

भारतीय राज्ये

Ganges नदी दक्षिणेकडे समुद्रास जाऊन मिळते त्यामुळे Gangaridai या राज्याची पूर्व सीमा नदीमुळे निसर्गतः तयार झाली आहे. हे राज्य त्याच्या प्रचंड आकाराच्या हत्तींसाठी प्रसिद्ध आहे. या हत्तीदळामुळेच या राज्यावरची सर्व परकीय आक्रमणे अयशस्वी ठरली आहेत.

अलेक्झांडरचे इतिहासकार असे म्हणतात की अलेक्झांडरने देखील या हत्तीदळाला घाबरून Gangaridai वर आक्रमण करण्याचे टाळले. हे Gangaridai शहर म्हणजे नक्की कोणते हे आज कळत नाही. पण Gangaridai हे “गंगाहृदय” शब्दाचे ग्रीक रूप असावे.

Taprobane चा प्रदेश भारतीय भूमीपासून एका नदीमुळे वेगळा आहे. तेथील लोकांना Palaigonoi असे नाव आहे आणि हा प्रदेश सोनं चांदी आणि मोत्यांसाठी प्रसिद्ध आहे.

Taprobane म्हणजेच “तम्बपंणी” म्हणजेच सध्याचा श्रीलंका देश. श्रीलंका मोत्यांसाठी कमीत-कमी २३०० वर्षांपासून प्रसिद्ध आहे हे यावरून समजतं.

गंगा नदीत एक मोठे बेट आहे जिथे Modogalingae नावाची जमात राहते आणि नदीच्या पलीकडे Abali, Preti, Sasuri, Andarae या जमाती राहतात. पण Prassii चे सामर्थ्य या सर्वांहून अधिक आहे. या Prasii ची राजधानी Palibothros आहे. या शहरात ६,००,००० पायदळ, ३०,००० घोडदळ आणि ९,००० हत्ती तैनात असतात.

पाटलीपुत्र अर्थात Palibothros

Ganges आणि Erranaboas या नदीच्या संगमापाशी Palibothra नावाचे एक शहर आहे. ही Erranaboas नदी भारतातील तिसरी मोठी नदी आहे. या शहराचे माप ८० स्टाडिया आणि १५ स्टाडिया असे आहे. या शहराच्या बाहेर संरक्षक भिंती आहेत. या संरक्षक भिंतींवरच सुमारे ५७० टेहळणी साठीचे बुरुज आहेत. या शहरात सांडपाण्याची उत्तम व्यवस्था आहे. हे शहर ज्या प्रदेशाचा भाग आहे त्याला Praxii म्हणतात. Praxii चा राजा स्वतःच्या आणि स्वकुळाच्या नावाबरोबरच “Palibothros” ही पदवी लावतो.



कुम्हरार भागात सापडलेल्या राजवाड्याचे अवशेष



Megasthanes Archosia वरून Sandrokottos म्हणजेच चंद्रगुप्त मौर्याला भेटायला आला आणि असे म्हणतात की त्याला पाटलीपुत्र चा राजवाडा बघून Persia (इराण) मधल्या Susa आणि Persepolis च्या राजवाड्यांची आठवण झाली. उत्तर प्रदेशातल्या पाटणा मध्ये कुम्हरार भागात Archaelogistsना एका जुन्या राजवाड्याचे अवशेष मिळाले तो राजवाडा हाच असावा असे नंतर मानण्यात आले.

काही विशेष उल्लेख:

Sillas नावाची नदी इतर नद्यांपेक्षा खूप वेगळी आहे. आश्चर्याची गोष्ट अशी आहे कि या नदीमध्ये काही टाकले असता ते बुडते व अजिबात तरंगत नाही.

भारतातले जाणकार, तत्त्ववेत्ते (ऋषी, भिक्खू याअर्थी) एक कथा सांगतात जेव्हा भारतातली लोकं गावांमध्ये राहत होती तेव्हा पश्चिमेकडून Dionysus मोठी सेना घेऊन आला. त्यांनी संपूर्ण भारतावर वर्चस्व प्रस्थापित केले आणि येथील लोकांना द्राक्षापासुन मद्य कसे तयार करायचे ते शिकवले, त्याने अनेक कला भारतीयांना शिकवल्या, अनेक शहरे बांधली आणि न्यायदानाची पद्धत भारतीयांना त्यानेच शिकवली त्याच्या या योगदानामुळे पुढे भारतीयांनी त्याला देव मानले. भारतावर त्याने २५० वर्षे राज्य केले पुढे त्याच्या अनेक पिढ्यांनी राज्य केल्यावर भारतात गणराज्य पद्धतीचे शासन सुरु झाले.

तसेच याच कुळात Heracles ही जन्माला आला. तो सिंहाचे कातडे पांघरत. त्याला अनेक पुत्र आणि एक मुलगी होती त्याने त्याचे सर्व राज्य विभागून आपल्या मुलांना आणि मुलीला दिले. त्यानेसुद्धा अनेक शहरांची रचना केली त्यातलेच एक शहर म्हणजे Palibothra (पाटलीपुत्र) या शहरात त्याने अनेक महाल बांधले शहराभोवती भिंती बांधल्या, खंदक खोदले या मुळे त्याला अमाप किर्ती प्राप्त झाली.

हे Dionysus आणि Heracles म्हणजे नक्की कोण हे समजत नाही. त्यातल्या त्यात Heracles चे “सिंहाचे कातडे” हे वर्णन शिवाशी जुळणारे आहे. पण काही अभ्यासकांनी Heracles म्हणजे “हरेकृष्ण” असे निष्कर्ष काढले आहेत. जे सर्वमान्य नाहीत.

Praxii च्या प्रदेशात भारतातले सर्वांत मोठे वाघ राहतात जे सिंहापेक्षा दुप्पट आकाराचे आहेत. भारतातली सर्वात छोटी माकडे ही मोठ्या कुत्र्यांपेक्षा मोठी आहेत. ही माकडे बरीच माणसाळलेली असल्यामुळे ती सहसा हल्ला करत नाहीत. भारतातले काही साप २ Cubit (1 Cubit म्हणजे १८ इंच) लांबीचे आहेत ज्यांना वटवाघुळासारखे पंख आहेत. हे साप बैल आणि मेंढ्यासारखे प्राणी सहज गिळून टाकतात. भारतात मोठे, उडणारे विंचू आहेत. हे विंचू रात्री बाहेर पडतात आणि त्यांच्या संपर्काने त्वचेवर चट्टे उठतात. भारतातल्या समुद्रांत एक मासा आहे जो फक्त मेल्यावर पाण्यावर तरंगतो आणि इतर वेळेस खोल पाण्यात असतो या माश्याला हात लावल्यावर माणसे बेशुद्ध पडतात आणि काही वेळेस मरतात देखील.

भारतीय लोकांवर सर्वप्रथम आक्रमण Bacchus यानी केले. Bacchus पासून ते आत्तापर्यंत (Alexander पर्यंत) ६४५१ वर्ष झाली आहेत.

Bacchus हा ग्रीकांचा देव होता याचे दुसरे नाव Dionysus. उडणाऱ्या सापाबद्दल आज काही माहिती उपलब्ध नाही आणि तो मासा म्हणजे इलेक्ट्रिक सील असावा असं काही अभ्यासकांचे मत आहे.

भारताच्या पूर्वेकडे सुमारे ३००० Stadia उंचीचे एक पठार आहे. तिथे Derdai नामक एक जमात राहते. त्या पर्वतामध्ये सोन्याचे साठे आहेत आणि याच पठारावर काही ठराविक मुंग्या आहेत ज्या माती खोदुन सोनं सोनं बाहेर आणतात. या मुंग्यांचा आकार छोट्या मांजरीएवढा आहे. या मुंग्या वेगाने पळतात आणि सामान्यतःहिवाळ्यात हे असे खोदकाम करतात. त्यामुळे Derdai जमातीचे लोक या मुंग्यांचा वापर करून घेतात हे लोक या मुंग्यांना मांसाचे आमिष दाखवतात आणि त्यांनी खोदून आणलेले सोने पळवतात.

या सोनं खणून आणणाऱ्या मुंग्या देखील आज सापडत नाहीत (किंवा सापडल्या असतील तर कोणी त्याबद्दल बोलत नाही.)

या आणि अशा अनेक गोष्टींचा पत्ता न लागण्याची कारणे म्हणजे:

एकतर या मुंग्या ते नाकपुड्या नसलेले लोक आणि तत्सम जमाती खरच होत्या आणि आता नाहीत पण हे मान्य करणं थोडं अवघड आहे कारण बाकी तत्कालीन दुसऱ्या कोणत्याच लेखात किंवा साहित्यात यांचा उल्लेख सापडत नाही.

दुसरी एक शक्यता आहे की Indika ची मूळ प्रत नसल्यामुळे आणि हि सर्व माहिती नंतरच्या इतिहासकारांकडून आपल्यापर्यंत पोहोचली असल्यामुळे या मधल्या इतिहासकारांनी चुकीचे Interpretation केले असेल.

… काहीही असो, कितीही मतभिन्नता असो, पण या अनेक “तुकड्यां”मुळे २३०० वर्षांपूर्वीच्या भारताची कल्पना आपण करू शकतो ते ह्या Megasthanes मुळे आणि त्याच्या Indika मुळेच!

 
 
ashwinchitale.home.blog
“San Basillias”
by Ashwin Chitale
13–17 minutes
“San Basillias” – “सॅन बॅसिलीयस”

हे उद्गार आहेत एका महान राजाचे..

ज्याची किर्ती भारतीय इतिहासात अजरामर झाली..

ज्यानी भारतावर स्वारी करणाऱ्या पहिल्या विध्वंसक आक्रमकांना प्रत्युत्तर दिले..

जो युद्ध हरून सुद्धा लाचार न होता विजयी राजाला एखाद्या वीरासारखा सामोरा गेला..

जेव्हा त्याला विजयी राजाकडून विचारण्यात आले की “तू आता हरला आहेस तर तुझ्यासोबत मी कसा व्यवहार करू? तुला कसे वागवू?”

तेव्हा तो म्हणाला “San Basillias” अर्थात “जसा एक राजा दुसऱ्या राजाला वागवेल तसे!”


१८ एप्रिल इसवी सन पूर्व ३२६..
आजपासून सुमारे २३४४ वर्षांपूर्वी..

Alexander Cophen (काबुल) आणि Indus (सिंधू) या दोन नद्यांच्या मध्ये असलेल्या Dionysus निर्मिलेल्या Nysa नगरीपर्यंत आला..

तेव्हा तिथला Acuphis नावाचा नगरप्रमुख आपल्या ३० अंगरक्षकांसोबत Alexander च्या तंबू मध्ये गेला. 

Alexander त्याचे शिरस्त्राण घालून आणि हातात भाला धरून आसनावर बसला होता. त्याचे चिलखत धुळीने माखले होते. Acuphis आणि त्याचे रक्षक तंबूत गेले आणि त्यांनी Alxander ला Nysa च्या शहरावर आणि तिथल्या लोकांवर दया दाखवून सोडून देण्याची मागणी केली. बदल्यात Alexander नी Nysa च्या अधिकाऱ्यांकडे त्यांच्या सर्वोत्कृष्ट ३०० घोडेस्वार आपल्याबरोबर पाठवायची आज्ञा दिली.

या सर्व सैन्यासकट Alexanderने Indus ओलांडली. Indus (सिंधू) नदीकडून Hydaspes (झेलम) कडे कूच करायला लागला.

Alexander Indus आणि Hydaspes या दोन नद्यांच्या प्रदेशात असलेल्या सर्वात मोठ्या शहरात – तक्षशीलेत – पोहोचला.
तिथे त्याचे अत्यंत आनंदाने स्वागत झाले.
त्याच्या स्वागताला तक्षशीलाधीश Abisares (अंभी)चे आणि त्याच प्रांतातल्या Doxereus सारख्या राजांचे दूत नजराणे घेऊन हजर होते. Alexander ने तिथे प्रथेप्रमाणे विधी केले. Phillip या अधिकाऱ्याला तक्षशीलेचा Satrap (प्रांतिक अधिकारी) नेमले. सैन्यातील जखमी, आजारी सैनिकांची एक तुकडी तक्षशीलेत ठेऊन ५००० तक्षशीलेच्या सैनिकांना बरोबर आणि स्वतःच्या Maecdonian सैनिकांना बरोबर घेऊन तो Hydaspesकडे अर्थात झेलमच्या दिशेने निघाला.

Hydaspes च्या किनाऱ्यावर येताच नदीच्या पलीकडच्या बाजूला Porus (पुरू) राजा त्याच्या संपूर्ण सैन्यासकट Alexander ला रोखायच्या आणि गरज पडल्यास नदी ओलांडताना सैन्यावर हल्ला करायच्या तयारीत होता. हे बघून Alexander ने Coenus या त्याच्या अधिकाऱ्याला पुढची आज्ञा दिली.






या आज्ञेप्रमाणे काही दिवसांतच Coenus ने ज्या होड्या-गलबतांमुळे Alexander च्या सैन्याने सिंधू ओलांडली होती, त्यांचे तुकडे झेलम नदीच्या किनारी आणले आणि त्या तुकड्यांपासून पुन्हा गलबते तयार केली. या संपूर्ण काळात Porus त्याच्या सैन्यासकट, बलाढ्य हत्तींसकट आणि घोड्यांसकट Hydaspes च्या विरुद्ध किनाऱ्यावर थांबला होता. अहोरात्र त्याचे सैनिक नदीवर पहारा देत होते. नदीचा तुफान वेग आणि नदीतील पाणी याचा विचार करून Alexander ने विश्रांतीचा निर्णय घेतला आहे असे Porus ला वाटावे यासाठी Alexander ने सर्व योजना केल्या. उत्तरायणाचा काळ असल्याने नदीला खूप पाणी होते त्यात अनेक भोवरे आणि प्रवाह तयार झाले होते. तरीदेखील काही ठिकाणी नदी ओलांडता येईल इतकी उथळ होती.
Alexanderने आपल्या सैन्यात अशी बातमी पसरवली की हिवाळा सुरु होईपर्यंत इथे थांबायचे आहे. पण सातत्याने तो आणि त्याचे अधिकारी Porus च्या नकळत नदी ओलांडण्यासाठी रस्ता शोधत होते.

Porus च्या मोठ्या सैन्यामुळे आणि रौद्र रूप धारण केलेल्या नदीमुळे Macedonian सैनिकांच्या मनात या युद्धाबद्दल आधीच भीती निर्माण झाली आणि त्यात Porus च्या सैन्यात असलेल्या हत्तींची संख्या लक्षात घेता घोडेस्वारांचे घोडे बिथरण्याचा धोका होता यामुळेच सैन्यातल्या घोडदळ आणि पायदळ दोन्ही तुकड्यांना पाठवणे सोयीस्कर नव्हते.

खूप काळ विचार करून Alexander ने पुढील योजना आखली- एका रात्री Alexander स्वतः त्याच्या सैन्यासकट नदीकिनारी आला. तिथे येऊन त्याच्या सैन्याने घोषणा देण्यास सुरुवात केली, Enyalius चा जयजयकार सुरु केला. आवाज करून गडबड-गोंधळ घालायचा प्रयत्न केला. यामुळे इच्छित परिणाम साधला गेला.

‘Alexander चाल करून येत आहे’ असे Porus ला वाटले आणि Porus पण त्याचे संपूर्ण सैन्य घेऊन तयार झाला. पण Alexander आलाच नाही. हे खूप दिवस चालू राहिले. रोज रात्री परस्परांचे सैन्य समोरासमोर येत पण पुढे काहीच होत नसे. काही काळानंतर Porus फक्त त्याच्या सैनिकांना नदीकिनारी तैनात राहायला सांगू लागला आणि स्वतः रात्री यायचे बंद झाला. जेव्हा Alexander च्या हे लक्षात आले, की Porus या रात्रीच्या हल्ल्यांबद्दल बेफिकीर झाला आहे, तेव्हा त्याने योजनेचा पुढचा टप्पा अमलात आणला.

सैन्याच्या मुख्य तळाच्या उत्तरेला नदी मोठे वळण घेत होती तिथे एक भूशिर तयार झाले होते. Alexanderने आपल्या सैन्यासोबत नदी ओलांडण्यासाठी या जागेची निवड केली. ही जागा मुख्य तळापासून १५० स्टाडीया लांब होती. Alexander ने आपल्या सैनिकांना तळापासून ते त्या भूशिरापर्यंत अशा रीतीने तैनात केले की ते एकमेकांना संकेत देऊन Alexander ची नदी ओलांडायची बातमी लवकरात लवकर मुख्य तळापर्यंत पोहोचवू शकतील.

त्याने Craterus या आपल्या सेनापती ला मुख्य तळाची जबाबदारी दिली आणि त्याला स्पष्ट आदेश दिले की जोपर्यंत Porus Alexander ने नदी ओलांडून आणलेल्या तुकडीवर हल्ला करण्यासाठी स्वतःचे संपूर्ण सैन्य घेऊन निघत नाही, तोपर्यंत Craterusने देखील तळाच्या जागेवरून नदी ओलांडायची नाही. यामागचा मुख्य उद्देश असा होता की Porus च्या हत्तींना Alexander ने स्वतःकडे आणणे म्हणजे त्याचे मुख्य घोडदळ Porus च्या तळावर हल्ला करू शकेल. असे सर्व आदेश देऊन Alexander नदी ओलांडण्यासाठी गुप्तपणे रवाना झाला. त्याने स्वतःबरोबर मुख्यतः पायदळ आणि थोडे घोडे घेतले त्यात Scythia, Sogdiana, Bactria प्रांतातले अनेक सैनिक होते.






नदी ओलांडायच्या रात्री सोसाट्याचा वारा आणि पाऊस सुरु झाला यामुळे Alexander ला फायदा झाला. कारण आता घोड्यांच्या टापांचे आणि सैनिकांचे आवाज Porus पर्यंत पोहोचणार नव्हता. आता वेळ घालवण्यात अर्थ नव्हता. नदीच्या पात्रात एक मोठे बेट तयार झाले होते. या बेटावर Alexander चे सैन्य छोट्या जहाज-होड्या आणि गलबतांच्या मदतीने पोहोचले. आता यापुढचा प्रवाह चालत ओलांडणे शक्य होते. पाऊस कमी होऊ लागला वादळाची तीव्रता सुद्धा कमी झाली. पूर्वेला केशरी-तांबट रंग पसरले. आणखीन जास्त प्रकाश पडायच्या आत राहिलेली नदी ओलांडून Porus ने तैनात केलेल्या सैनिकांना अनपेक्षितपणे सामोरे जाणे आत्यंतिक महत्त्वाचे बनले. सैन्य पात्रात घुसले. घोड्यांचा आवाज सुरु झाला. जसे सैन्य पुढे सरकत होते तसे नदीचे पाणी हळू हळू सैनिकांच्या छातीपर्यंत यायला लागले. घोड्यांच्या नाका-तोंडात पाणी जाऊ लागले. परत फिरायची वेळ आली असे वाटताच पायाखाली चढ जाणवला. पाणी ओसरायला लागले. Alexander स्वतः सर्वप्रथम पलीकडच्या काठावर आला. सर्व सैन्य जमले. Porus ला याची काहीच कल्पना आली नव्हती.

Alexander ने सैन्यरचना सुरु केली.

घोडदळाच्या सर्वात पुढे Scythia ची धनुर्धारी घोडेस्वारांची तुकडी होती. त्यांच्या मागे Seleucus Nikator च्या नेतृत्वाखाली ढाल आणि भाले असलेले Macedonia चे सैनिक. या तुकडीच्या दोन्ही बाजूला तलवारी आणि ढाल असलेले Macedonia चे सैनिक. त्यांच्या मागे धनुष्य-बाण असलेले पायदळ आणि मग बाकीचे सैनिक. या संपूर्ण रचनेच्या दोन्ही बाजूला Agrianes चे कुशल पायदळ आणि भाला फेकणाऱ्या सैनिकांची तुकडी आणि सर्वात मागे त्याच्या सर्वोत्कृष्ट अधिकाऱ्यांसोबत आणि रक्षकांसोबत स्वतः Alexander. पायदळाला थोड्या अवधीने यायची आज्ञा देऊन सुमारे सहा हजाराची फौज घेऊन तो पुढे निघाला.

एवढे होईपर्यंत Porus ला Alexander आल्याची बातमी कळून चुकली. Porus ने स्वतःच्या मुलाला Alexander च्या तुकडीकडे पाठवले. Porus चा पुत्र १२० रथ आणि सुमारे सहा हजाराचे घोडदळ घेऊन Alexander च्या सैन्यावर चाल करून गेला. नदीकिनारी लांबून सैन्य येत असलेले बघून Alexander ला वाटले खुद्द Porusच सैन्य घेऊन येत आहे. हे बघताच त्याने सर्वात पुढे धनुष्य असलेल्या घोडदळाच्या तुकडीला मागे पाठवले आणि साधे घोडदळ पुढे आणले. सैन्याच्या सर्वात पुढे Bucephalus या आपल्या आवडत्या घोड्यावर बसून स्वतः Alexander सैन्याचे नेतृत्व करू लागला.




Alexander आणि Porus चे सैन्य एकमेकांना भिडले. Porus चे मोठे जड रथ Alexander च्या चपळ घोडदळापुढे हार मानू लागले. Porus च्या पुत्राने फेकलेला भाला Alexander च्या लाडक्या घोड्याला लागला. घोडा चिखलात पडून ओरडू लागला. Alexander ने आपल्या धनुर्धारी सैनिकांना Porusच्या मुलाला लक्ष्य करण्यास सांगितले. त्याच्या आज्ञेनुसार Porus च्या मुलावर बाणांचा वर्षाव झाला आणि तो रथातच मृत्युमुखी पडला. आपला राजा पडलेला बघून Porus च्या सैन्याने माघार घ्यायला सुरुवात केली परंतु त्यांचे रथ आणि घोडे वळून परत मुख्य तळापाशी येईपर्यंत Macedonian सैनिकांनी त्यातले अर्ध्याहून अधिक घोडे आणि सैनिक मारले. जे थोडे थोडके बचावले ते तत्परतेने Porus ला त्याच्या मुलाच्या निधनाची बातमी द्यायला गेले.

इकडे Craterus ने नदी ओलांडायला सुरुवात केली. दुःखाने आणि संतापाने Porusने नदी ओलांडून चाल करून येत असलेल्या Craterus ची पर्वा न करता Alexander च्या तुकडीवर हल्ला केला. त्याच्याकडे सुमारे तीस हजाराचे पायदळ, ३०० रथ आणि २०० हत्ती असे संख्याबळ होते. सर्वात पुढे हत्तीदळ त्याच्यामागे पायदळ आणि मग घोडदळ आणि संपूर्ण सैन्याच्या दोन्ही बाजूंना रथ अशी त्याच्या सैन्याची रचना होती.



अशी सैन्याची रचना बघून Alexander ने देखील सर्वात पुढे असलेले त्याचे घोडदळ मागे आणले आणि त्याऐवजी भाला फेकणाऱ्या सैनिकांची तुकडी सर्वात पुढे ठेऊन त्यामागे स्वतःच्या तुकडीचे दोन भाग केले. एका तुकडीचे नेतृत्व Coenus कडे दिले आणि त्याला सैन्याच्या डाव्या बाजूनी जाऊन हल्ला करण्याची आज्ञा दिली आणि स्वतः सैन्याच्या उजवीकडून हल्ला चढवला. असा हल्ला करून एकसंध असणाऱ्या शत्रूच्या सैन्याला विखुरायला भाग पाडायचे आणि मग Seleucus, Antigenes आणि Tauron या अधिकाऱ्यांनी सैन्याच्या मधोमध घुसून शत्रुसैन्याचे दोन भाग करायचे अशी त्याची योजना होती.






Alexanderने पुन्हा बाणांचा वर्षाव करून शत्रूची डावी फळी मोडीत काढली. दरम्यान Coenus ने देखील शत्रूच्या उजव्या तुकडीचा पराभव केला आणि Porus च्या सैन्याच्या मागे जाऊन थांबला. यामुळे हवा तो परिणाम साधला गेला Porus च्या सैनिकांना तिन्ही बाजूनी शत्रूला सामोरे जावे लागणार होते. त्यामुळे गोंधळलेले Porus चे सैनिक विखुरायला सुरुवात झाली. याचा फायदा घेऊन Alexander ने हल्ला चढवला हे बघताच Macedonian सैनिकांच्या तुकडीने समोरून हल्ला केला.






समोरच्या तुकडीला चिरडत-मारत हत्तींनी चित्कार सुरु केले. एका बाजूने आत आलेली Alexander ची तुकडी शत्रू सैन्याला चिरत आत शिरली. बाण लागलेले घोडेस्वार जमिनीवर पडू लागले. बाणाने अचूक टिपलेले माहूत खाली पडून स्वतःच्याच हत्तींच्या पायाखाली चिरडले गेले. अनेक घोडे घोडेस्वारांशिवाय इकडे तिकडे खिंकाळत ओरडत पळत होते. घोड्यांचे, माणसांचे, हत्तींचे आवाज येऊ लागले. काही पिसाळलेले हत्ती आणि काही भाले मारून जखमी झालेले हत्ती सैन्याच्या तुकडीला वाटेल तसे चिरडत होते. रथ तुटून पडले. अनेक सैनिक युद्ध सोडून पळायला लागले आणि Coenus च्या तुकडीचे लक्ष्य बनले. जखमी झालेला Alexander त्याच्या रक्षकांसोबत युद्ध करत होता. Porus च्या उजव्या खांद्यात एक बाण घुसला होता पण त्याची पर्वा न करता तो लढत राहिला.






दरम्यान Coenus च्या मागून Craterus नदी ओलांडून आपली ताज्या दमाची तुकडी घेऊन तिथे आला आणि तो देखील युद्धात सामील झाला. हार मानून परत फिरणाऱ्या Porus च्या सैनिकांना सुद्धा त्याच्या तुकडीने सोडले नाही. थोड्या अवधीतच Alexander ची एक तुकडी, एक मुख्य तुकडी आणि Coenus ची एक, Creatareus ची एक अशा चार तुकड्या एकत्र झाल्या. आणि एकत्रितपणे उरलेल्या हत्तींवर आणि घोडेस्वारांवर त्यांनी हल्ला केला..

सगळीकडे मृत सैनिक, हत्ती, घोडे, तुटलेले रथ, रक्तपात आणि स्वतःबरोबर उरलेली शेवटची छोटी तुकडी 
याची Porus ला जाणीव झाली.

एवढे असून सुद्धा शेवटचा सैनिक लढेपर्यंत त्यांनी हार पत्करली नाही.

एका योद्ध्यासारखे आणि पराक्रमी सैनिकासारखे तो पराभवाला सामोरा गेला.

त्याचे चिलखत जागोजागी तुटून पडले होते. शरीराचा उजवा भाग रक्ताने माखला होता. उरलेल्या काही शेवटच्या हत्तीपैकी एकावर Porus चढला आणि असहाय्यपणे सैन्याच्या तळाकडे परतू लागला. हे बघताच Alexander ने तक्षशीलेच्या एका अधिकाऱ्याला Porusकडे पाठवले. तो अधिकारी घोड्यावर माघार घेत असलेल्या Porus च्या हत्तीसमोर जाऊन उभा राहिला आणि Porus ला पटवून देऊ लागला की माघार घेण्यापेक्षा Porus ने Alexander चा संदेश ऐकावा आणि समर्पण करावे. हत्तीवर बसलेल्या Porus ने जवळचा एक भाला डाव्या हाताने त्या घोड्यावर मारला. तो भाला चुकवत तक्षशीलेचा अधिकारी मागे फिरून Alexander कडे आला.

Alexander ने अनेक प्रयत्न केले; अनेक दूत पाठवले पण Porus ऐकत नव्हता. शेवटी Meros नावाचा Porusचाच एक जुना मित्र Porus कडे आला. तहानलेला-दमलेला Porus हत्तीवरुन खाली आला आणि त्याने Meros कडे पाण्याची याचना केली. पाणी पिऊन असहाय्यपणे त्याने Meros ला Alexanderकडे घेऊन जायची विनंती केली..

जेव्हा Alexnaderने Porus ला येताना बघितले तेव्हा तो त्याच्या सैन्याच्या सर्वात पुढे येऊन थांबला..

Alexander Porus चे रूप बघून आश्चर्यचकित झाला पराभूत असून देखील Porus ताठ मानेने Alexander कडे चालत येत होता. त्याच्या चेहऱ्यावर कुठेही भय नव्हते. एखाद्या वीरपुरुषासारखा तो Alexander ला सामोरा गेला.

Alexander घोड्यावरून उतरला. उंच Porus पुढे Alexander अगदीच बुटका दिसत होता.






Alexander पुढे होऊन म्हणाला:
“महान राजा Porus, सांग मला? मी तुला कशी वागणूक द्यावी?”

Porus किंचितही न हलता म्हणाला:
“Alexander, एक राजा दुसऱ्या राजाला जशी वागणूक देईल तशीच वागणूक तू मला दे”

या त्याच्या उत्तरावर Alexander आश्चर्यचकित झाला आणि त्याला Porus चे कौतुक वाटले..

Alexander ने त्याला सांगितले की Porusला हवे तसेच होईल पण त्याच्या आणखी काही इच्छा असतील तर त्या त्याने सांगाव्यात आणि Alexander त्यादेखील पूर्ण करेल. पण Porus काहीच बोलला नाही.

Alexander ने Porus ला त्याचा प्रांत परत केला याउपर त्याला बाजूचा एक प्रदेश खुश होऊन इनाम म्हणून दिला.

युद्ध संपले..

Alexander Hydaspes ओलांडून पुढे गेला, मात्र Porusने Alexander च्या मनात आणि भारतीय इतिहासात त्याचे अढळ स्थान प्राप्त केले..






स्पष्टीकरण:
1. Nysa या शहराचा आज पत्ता लागत नाही.
2. Hydaspes हे झेलमला ग्रीकांनी दिलेले नाव. आजच्या झेलम नदीचे मुळ नाव “वितस्ता” त्याचे ग्रीक रूप म्हणजे Hydaspes.
3. Alexander ची नद्या ओलांडायची नेमकी पद्धत आज अज्ञात आहे. पण छोटी जहाजे, होड्या या त्या-त्या नदीकिनारी बनवायच्या. त्यात बसून नदी ओलांडायची आणि मग परत त्या होड्यांची लाकडे पुढच्या नदीपर्यंत न्यायची ही पद्धत प्राचीन रोमन सैनिकांनी सुद्धा वापरली त्यावरूनच Alexander ने देखील हीच पद्धत वापरली होती असे म्हणता येईल.
4. पाकिस्तान-अफगाणिस्तान भागातल्या जवळ जवळ सर्व नद्या या हिमालयात उगम पावतात. उन्हाळ्यात अर्थात एप्रिल मध्ये हिमालयात वितळलेला बर्फ नद्यांच्या रूपाने दुथडी भरून वाहतो त्यामुळेच, अफगाणिस्तान-पाकिस्तानातल्या नद्या या एप्रिल-मे च्या दरम्यान संपूर्ण भरून वाहतात.
5. Enyalius ही ग्रीकांची एक युद्धदेवता.
6. एक स्टाडीया म्हणजे १८५ मीटर्स.
7. या घोड्याला Alexanderने वयाच्या १३व्या वर्षी एका पैजेवर नियंत्रित केले होते आणि या घटनेवरून फिलीप या त्याच्या वडिलांनी त्याला जग जिंकायला प्रेरित केले होते असे म्हणतात.
8. Alexanderने या युद्धाच्या स्मृतीप्रित्यर्थ तयार केलेलं नाणे:
*डाव्याबाजूला हत्तीवारचा Porus आणि घोड्यावरचा Alexander.
*उजव्या बाजूला ग्रीक देवता Nike राजाला मुकुट घालताना.





9. एखाद्या सबळ लिखित पुराव्याशिवाय या किंवा तत्सम कोणत्याही युद्धाची नेमकी तारीख काढणे अशक्य असते. पण इतिहासतज्ञांनी ढोबळ मानाने आणि बाकीच्या ग्रांथिक पुराव्यातून मिळालेल्या उल्लेखानुसार हे युद्ध एप्रिल-मे दरम्यान झाले असावे.
10. या युद्धाची फक्त Alexanderची बाजू आपल्याला  माहित आहे; त्याच्याबरोबर आलेल्या इतिहासकारांनी याची नोंद ठेवल्यामुळे Porus चे असामान्य व्यक्तिमत्त्व आपल्यापर्यंत पोहोचू शकले यात शंका नाही.

**संदर्भग्रंथ:
1. “Anabasis of Alexander” by Arrian (Translated by: E. J. Chinnock)
2. “Alexander of Macedon, 356-323 B.C.: A Historical Biography” by Peter Green
3. “Life of Alexander” by Plutarch
4. Image Courtesy: Wikipedia (All the images belong to their respective creators/owners no copyright infringement intended.)
Email id: chitaleashwin96@gmail.com

 
History of Satara
 http://historyofsatara.blogspot.com/2009/09/blog-post_5793.html
 इसवी सनापूर्वी २०० वर्षे.......,..
आजपासून सुमारे २२०० वर्षापूर्वी,
मध्यभारतातील जबलपूर जवळच्या भारहूत स्तूपाला कराडच्या भक्तगणाने दिलेल्या देणगीचा उल्लेख आहे. सातारच्या दक्षिणेचा सुपिक प्रदेश, जिथं बौद्ध गुंफा मंदीरे आहेत-- एवढ्या दूरवर जाणा-या भक्तांचा होता. शेकडोमैलावरील मंदीराला देणगी देऊ शकणा-या दानी श्रीमंतांचा होता.
देणगीचा लेख व्हावा इतक्या योग्यतेचे श्रेष्ठी इथं होते. मग प्रदेश किती सुजलाम सुफलाम असेल? व्यापारी इतकेश्रीमंत तर सामान्यजन किती सुखी असतील?
साता-यात पैशाची देवघेव मोठ्याप्रमाणावर चालत होती. महाड, दाभोळ ,चिपळूण या बंदरातून चालणा-या व्यापाराच्या मार्गावरचे काफीले, उत्तमोत्तम माल लादलेल्या बैलांचे तांडे -- वरंधा , कुंभार्ली घाटातून, सातारच्या डोंगर द-यातून जात.
अनेक पाणपोया, थांबे, खानावळी अन व्यापारीमार्गावरच्या सुरक्षारक्षकांच्या वर्दळीनं गजबजलेला सातारा.
 
अरुणोदयापूर्वी
साडेचौदाशे वर्षांपूर्वी चालुक्यांच्या अधिपत्याखाली, हजार वर्षांपूर्वी राष्ट्रकूटांच्या छत्राखाली, आठशे वर्षांपूर्वी शिलाहारांच्या राज्यात सातारा नांदत होता.
सातशे वर्षांपूर्वी हसन गंगू बहामनीनं कुलबर्ग्य़ाच्या राजधानीतून १३४७ मध्ये बहामनी राज्य उभं केलं. १३५७ मध्ये या राज्याच्या चार "तर्फ" केल्या. प्रत्येकावर तरफदार किंवा राज्यपाल नेमण्यात आले.
सातारा कुलबर्ग्याच्या तरफेत जमा झाला.
 
पातशाही जमाना
सुमारे साडेसहाशे वर्षांपूर्वी...
मुह्म्मद शाह बहामनीच्या राज्यात व्यापारी मार्गावरील लुटारुंचा बंदोबस्त केला गेला. दख्खन शांती आणिभरभराटीच्य़ा वातावरणात भविष्याकडे आशावादी दॄष्टीने पहात होता. याच काळात सातारचा किल्ला बांधला गेला.
हुक्के बयान .... त्याचं नाव. आधीच्या बांधकामात सुधारणा केली गेली.


पुढं काळाच्या मनात काय होतं?
१३९६ ते १४०७.............
या बारा वर्षांत पावसानं तोंड फिरवलं. रानं वैराण झाली. धूळ आकाशा भिडली. वस्त्या निर्मनुष्य होत गेल्या. १०,००० बैलांच्या पाठीवरून गुजरातेतून धान्य आणवलं.
मंगळवेढ्य़ाच्या दामाजी पंतांनी बादशहाच्या परवानगी वाचून भुकेल्यांसाठी सरकारी गोदामं लुटवली. हजारोंचे प्राण वाचवले. बादशहाची इतराजी झाली. विठ्ठलानं बीदरला जाऊन रक्कम भरली, ती याच वेळी.


गावं ओसाड बनली. गुरं-ढोरं पटापट मरु लागली. रयतेनं बंड पुकारलं. दौलताबादेहून मलिक उत्तुजार खटावदेशी आला. त्यानं बंड शमवलं. बादशाही फौजा वाई पर्यंत आल्या. ही १४२६ ची गोष्ट. मलिक उत्तुजारला शिर्के आणि विशाळगडच्या शंकररायनं गनिमीकाव्यानं खिंडीत पकडून फौजेसह बुडवलं.

पहिला गनिमीकावा.

दुर्गादेवीच्या दुष्काळानं माणसं नेली. १४७४ मध्ये पाउस आला. नांगरायला गुरं नव्हती, नांगर धरायला माणसं नव्हती. 
१४८१ मध्ये युसुफ आदीलखानाने विजापूरला आदीलशाही स्थापली, सातारा आदीलशाहीला जोडले गेले.
 सातारा आदीलशाही परगण्यात तालुक्यात हरवून गेलं. अमील शेतसारा गोळा करु लागले. मोकासदार अमीलदारंवर हुकमत करु लागले. सुभा किंवा सुभेदार सातारची कायदा अन सुव्यवस्था संभाळू लागले.
किल्ल्यांवर किल्लेदार आले, जहागीरदार देशमुख वतनांवर वतनदार आले.
 सातारचे सरदार
जावळीला चंद्रराव मोरे आले, फलटणला राव नाईक निंबाळकर आले. मलवडीला झुंझारराव घाडगे आले. म्हसवडला माने आले.
 
Monday, July 5, 2010


ताम्रपट
पूर्वी महत्वाच्या आज्ञा तांब्याच्या पत्र्यावर कोरून ठेवत. तांबे ठोकून त्याचा पत्रा बनवीत. त्यावर कोरणीने कोरत असत. एकापेक्षा अधिक पत्र्यांना कडीने एकत्र करीत असत. कडीच्या जोडावर खास मुद्रा असे.
असे पत्रे कोरणारे करणिक - कुलकरणिक. त्याचे प्रमुख करणाध्यक्ष. ज्यांच्याकडे असे पत्रे सुरक्षित ठेवत ते पटलाध्यक्ष (पाटील). या दोघांसमक्ष राजा दानपत्र प्रदान करीत असे.
वळई ताम्रपट
साता-यापासून  दक्षिणपूर्वेला जिल्ह्याच्या टोकाला, भोजलिंगाच्या डोंगराजवळ, काळेलांचा गाव आहे. गाव महाराष्ट्रात मातीपासून मीठ (मेंगेमीठ) बनवणा-या समाजाचे आहे - लोणारी समाजाचे !
गावाचा देव श्री भोजलिंग. म्हसवडच्या श्री सिद्धनाथ मंदीरात इथल्या सासन काठ्या जातात. यांच्याकडे वंशपरंपरेने ताम्रपट आहे. त्याला देवाइतकाच मान.   
 
 
, July 6, 2010


वाचन
हे पहिले पृष्ठ आहे पहिल्या काही ओळी राजाच्या वंशावळी विषयी माहिती देतात. त्यानंतर पूर्वजांच्या गुणांचे वर्णन आहे. नंतर १४ ब्राह्मणांचा नाव व गोत्रासह उल्लेख आहे. त्यानंतर दान केलेल्या गावाचा उल्लेख आहे. त्याच्या चतुःसीमा आहेत. शेवटी काळ, साक्षीदार, अधिकारी यांच्या नावांच्या उल्लेखाने शेवट.
एकूण तीन पत्रे आहेत. मात्र लेख केवळ चार पृष्ठांवर आहे. मुखपृष्ठ मलपृष्ठ कोरे आहे.
एकदा मधला पत्रा सोडवून पुन्हा उलटा गोवला आहे.
 
 
 
 
देवनागरी लिप्यंतरDevnagarI Transcription

 
 
Meaning in Marathi
आपल्या पराक्रमाने विदर्भ आणि अश्मक(मराठवाडा) मंडलांचा थरकाप उडवणारा, मानांक नृपती होऊन गेला. तो धनवान कुंतलांचा प्रशासक, प्रजेत सुकीर्तीने, साधूंमध्ये विनयाने, शत्रूत शौर्याने, राजांमध्ये त्यागाने अशा गुणांमुळे सर्वत्र जो प्रकाशित आहे, आणि देह सोडून गेल्यावर देखील जो गुणांमुळे येथे स्थिर आहे. त्याचा पुत्र देवराज, जो देवराज (इंद्रा) प्रमाणे संपत्तीचे कण बेभानपणे गुप्ततेने उधळतो. विनयाने शौर्य त्यागा विना भू तितिर प्रमेय सत्य होते. ग्रह नक्षत्रांची स्थिती जोवर आहे तोवर भोगण्यास योग्य. गुंड आणि भाडोत्री सैनिकांना प्रवेश नसणारे, जेथील प्राण्यांची खरेदी होऊ शकणार नाही अशा -
ब्राह्मण कौण्डिण्यस गोत्र कुमार स्वामी, हारित गोत्र चंद्र  स्वामी, वत्स गोत्र बोप्प  स्वामी, कौण्डिण्य गोत्र चवनाग  स्वामी, कृष्णात्रेय गोत्र यज्ञ  स्वामी,  मठर गोत्र इन्द्र  स्वामी, कौशिक गोत्र मातृ  स्वामी,भारद्वाज गोत्र गोप  स्वामी, गोतमगोत्र खोल्ल  स्वामी,  काश्यपगोत्र श्री  स्वामी,  आपल्या बोलण्याने एकत्र येवून चाळीस ब्राह्मण धरणे धरून बसले. त्यांचे जोरजोराने ओरडणे ऐकून राष्ट्रकूट खरोखर जो खाली उतरून समजून घेतो. धर्मपर राज्य  करतो  लोकांना एकत्र करून त्यांना तोडून न टाकता न फसवता. ज्याचे गुण शुद्ध प्रकाशतो,त्याचा पुत्र सुद्धा राजांवर विजय मिळवणारा आहे. रुढीने वाकणारा  कुत्रासुद्धा  पवित्र नसतो. सहा वर्गशत्रूंना न जुमानता राज्य करतो तो खरोखरच अविधेय. न मोजता येणारे देण्यास सदैव पुढे येणारा खरेच तयार. तयार प्रमुख  शत्रू आणि याचकांचा आवडता.ज्याला जे हवे ते देणारा. शत्रूंना मृत्यू आणि याचकांना प्रेम. तेंव्हा त्याने राजमाता मातापिता आणि स्वतःच्या यश पुण्ण्याच्या वृद्धी साठी उलाहिका नावाचे(/लाहिकांचे ) गाव ब्राह्मणांना भक्तिभावाने(/सत्क्रीयेने ) दान केले. महामार्गशिर्ष वर्षाच्या चन्द्रग्रहणानिमित्त दान. भगवान  वेदव्यासानी लिहून ठेवले आहे, भरपूर जमीन दान करणा-या राजानी, सगर आदिनी (सांगीतले) जेंव्हा ज्याची जमीन तेंव्हा त्याचे फळ. यास होकार देणा-यास साठ हजार वर्षे स्वर्गात आनंद मिळेल. अन्यथा नरकात जागा. न्यायदान जाहीर केले. अपलक (/प्रपालक= रक्षणकर्त्याचे) स्थान दक्षिणेने वेणुगिरी पश्चिमेने कुकुडवाड  उत्तरेने हिवरेवाडीवत न्यायदान कोरले(लिहिले)------------- अविधेय विशयपति जीवदेव सन्तकाने(मालकाने) गावच्या पाटलाने सर्व करणाध्यक्षांसमोर   देवदत्ताने कोरले.
 
स्थाननिश्चय location
शेवटच्या काही ओळीत कुत्कुतवट, हिमिरवाडी, वेणुगिरी ही नावे आहेत. दान केलेले गाव उलहिका आहे.
आज त्यापैकी हिवरवाडी कुकुड्वाड ही गावे नांदती आहेत. सातारच्या दक्षिण पूर्वेला मायणी म्हसवड रस्त्यावर कुकुडवाड आहे.
चहू बाजूनी डॊंगरानी वेढलेले. उजाड बोडक्या टेकड्या. माळराने. मात्र खिंड ओलंडताच हिरवेगार. त्याच्या पश्चिमेला हिवरवाडी आहे, खिंडीअलीकडे.
ताम्रपटात कुकुड्वाडच्या पूर्वेला, हिवरवाडीच्या दक्षिणेला, वेणुगिरीच्या उत्तरेला स्थान सांगीतले आहे.

 
विषेश Important

जोडाक्षरे:- या लिपीत जोडाक्षरे प्रथम उच्चारले जाणारे वर त्या खाली नंतरचे असे लिहिले आहे
ऋ या अक्षराऐवजी अर्धा र आणि इ वापरला आहे जसे नृ ऐवजी न्री
ज्ञ ऐवजी ञ्ज वापरले आहे.
अक्षरवळण गुप्त कालीन आहे
कालनिर्णय
ताम्रपट वाचणे सोपे आहे,त्याचा अर्थही लावणे सोपे आहे. मात्र कालनिर्णय सर्वात कठिण काम. 
या लेखात मानांक, देवराज, अविधेय याची नावे आली आहेत. सन्मान्य मिराशींच्या नोंदीनुसार अविधेय हा ४४० ते ४५६ दरम्यान होऊन गेला.
अक्षराचे वळण सर्वसाधारणपणे शतकाप्रमाणे बदलत जाते, भौगोलिक स्थितीनुसार बदलत जाते. प्रस्तुत वळण हे दुसरे शतक ई.स. नंतरचे आणि सहाव्या शतकापूर्वीचे आहे.
दान देण्याचे कारण चंद्रग्रहण" महामार्गशिर्ष वैशाखस्य चंद्रपरागे"
चंद्रग्रहण नेहमी पूर्णचंद्राला पौर्णिमेला होते. म्हणजे वैशाख पौर्णिमा ही तिथी आहे.
महामार्गशिर्ष म्हणजे काय?
हे संवत्सराचे नाव आहे. बार्ह्यस्पत्य कालगणनेत असा उल्लेख केला जातो. 


  ताम्रपाषाण काल सामान्य ज्ञान जानकारी |ताम्रपाषाणकालीन स्थल |Chalcolithic period general knowledge in HIndi
Admin
Admin
October 09, 2024 6 minute read
0
 ताम्रपाषाण काल, ताम्रपाषाणकालीन स्थल सामान्य ज्ञान जानकारी 
ताम्रपाषाण काल सामान्य ज्ञान जानकारी |ताम्रपाषाणकालीन स्थल  |Chalcolithic period general knowledge in HIndi




ताम्रपाषाण काल (2000 ई. पू. 500 ई. पू.) 

ताम्रपाषाण काल को अंग्रेजी में Chalcolithic Age कहते हैं। 
मनुष्य द्वारा प्रयोग में लाई जाने वाली प्रथम धातु तांबा थी। इस काल में प्रस्तर तांबा के साथ-साथ निम्न गुणवत्तायुक्त कांसे का भी प्रयोग होता था। 
आहार / गिलुन्द / बनास संस्कृति (3000 ई. पू. 1500 ई. पू.) 
राजस्थान के दक्षिण-पूर्व में बनास नदी घाटी में बनास संस्कृति का विकास हुआ। 
ताम्रपाषाण संस्कृति की मुख्य विशेषताओं को दर्शाने वाले स्थल आहार के नाम पर इसे आहार संस्कृति भी कहा जाता है। 

आहार को ताम्रवती कहा गया है, क्योंकि यहां से पत्थर के बजाय ज्यादातर तांबे के ही औजार प्राप्त हुए। 
आहार के उत्तर-पूर्व में स्थित गिलुन्द से भी पत्थरों के नगण्य उपयोग तथा ईंटों के अधिक प्रयोग के साक्ष्य प्राप्त हुए गिलुन्दर से फलक उद्योग भी प्राप्त हुए हैं।
एच. डी. संकालिया के द्वारा किए गए उत्खनन में यहां से अग्निकुण्ड का साक्ष्य भी मिला है। 


कायथा संस्कृति (2000 ई. पू. 1800 ई. पू.) 
1664 ई. में वी. एस. वाकड़कर द्वारा कायथा संस्कृति को प्रकाश में लाया गया।
कायथा संस्कृति हड़प्पा संस्कृति की कनिष्ठ समकालीन मानी जाती है। यहां के कुछ मृदभांडों पर प्राक् हड़प्पाई तथा कुछ पर हड़प्पाई प्रभाव दिखाई देता है। 


स्वाल्दा संस्कृति (2000 ई. पू. 1800 ई. पू.) -यह संस्कृति ताप्ती नदी घाटी में स्थित थी। 



एरण / नवदाटोली / नागदा / मालवा संस्कृति (1700 ई. पू. 1200 ई. पू.) -
मालवा संस्कृति अपने मृदभांडों (चित्रित काले व लाल मृदभांड) की उत्कंष्टता के लिए जाने जाते हैं। मालवा संस्कृति के लोग कटाई, बुनाई में भी दक्ष थे। यहां से चरखे तथा तकलियों के साक्ष्य प्राप्त हुए हैं। 
एच. डी. संकालिया द्वारा उत्खनित नवदाटोली मालवा संस्कृति का सबसे विस्तृत ताम्रपाषाणकालीन ग्रामीण स्थल है। यहां से सर्वाधिक फसलों की संख्या प्राप्त हुई है।
 

जोरवे संस्कृति ( 1400 ई. पू. 700 ई. पू.) 
जोरवे संस्कृति के अन्तर्गत प्रमुख स्थल महाराष्ट्र में गोदावरी व उसकी सहायक प्रवरा नदी घाटी में स्थित जोरवे, नेवासा, दायमाबाद ईनामगांव, प्रकाश, चंदोली आदि हैं। इस संस्कृति की सर्वप्रमुख विशेषता पूर्ण शवाधान एवं कलश शवाधान पद्धति है। यहां घरों के फर्श के नीचे बड़ी संख्या में बच्चों के शवों के साथ कलश भी दफनाए जाते थे, जिनमें मृतक की आवश्यकता की वस्तुएं रखी जाती थीं। 
यहां मृतक को उत्तर दक्षिण दिशा में दफनाया जाता था। जबकि उत्तर भारत में आंशिक समाधान पद्धति थी इस संस्कृति के शवाधानों से प्राप्त अस्थियों के अध्ययन से वयस्कों व शिशुओं में दंतक्षरण तथा शिशुओं में स्कर्बी रोग का पता चलता है। 
जोरवे संस्कृति के अन्तर्गत ईनामगांव से कृतिम सिंचाई के प्राचीनतम् साक्ष्य प्राप्त होते हैं। यहां से बस्ती की किले बंदी के भी साक्ष्य प्राप्त होते हैं। यहां केन्द्र में शासक वर्ग, पश्चिम में शिल्पी व प्राचीर के किनारे शेष लोगों के रहने के साक्ष्य प्राप्त होते हैं, जिससे सामाजिक दूरी जाहिर होती है। 
जोरवे संस्कृति के अन्तर्गत नेवासा नामक स्थान से पटसन, नैदानिक मृदभांड व टोटीदार बर्तन के साक्ष्य प्राप्त होते हैं। यहां से रेशम उत्पादन के विश्व के प्राचीनतम् साक्ष्य प्राप्त हुए हैं। 
इस संस्कृति के अन्तर्गत दायमाबाद नामक स्थान से तांबे का रथ, भैंसा, हाथी व गैंडा के साक्ष्य तथा गणेश पूजा के साक्ष्य प्राप्त होते हैं। दायमाबाद हड़प्पाकालीन स्थल भी था। हड़प्पा काल में यहां से कांसे का रथ मिला है, जिसमें दो बैलों की जोड़ी जुती है और इसे एक नग्न मानव चला रहा है।
पूर्वी भारत स्थित ताम्रपाषाणकालीन स्थल 
उत्तर प्रदेश स्थित खैराडीह व नरहन, बिहार स्थित चिरान्द, सेनुआर, सोनपुर व ताराडीह, बंगाल स्थित पांडू रजार ढीबी व महीसादल से भी ताम्रपाषाणकालीन वस्तुएं प्राप्त हुई हैं।
दक्षिण भारत स्थित ताम्रपाषाणकालीन स्थल :
दक्षिण भारत में ब्रह्मगिरी, मास्की, संगेनकल्लू, पिकलीहल, उतनूर, पोचमपल्ली,   नागार्जुनकोण्ड, कोडक्कल आदि स्थानों से ताम्रपाषाणकालीन संस्कृति के साक्ष्य प्राप्त होते हैं। इनकी सर्वप्रमुख विशेषता भस्म टीले (Ash Mont) हैं, जो मवेशी रखने वाली बस्ती के अवशेष हैं। यहां वर्ष के अन्त में मवेशी के गोबर व बाड़े की लकड़ियों को जला दिया जाता था, जिनसे भस्म टीलों का निर्माण हो गया था।
 

लौह युग : 
दक्षिण भारत में ताम्रपाषाणकाल का अन्त व लोह युग का प्रारंभ 1000 ई. पू. में हुआ। यहां से लाल व काले मृदभांडों के साथ लौह उपकरण भी प्राप्त होते हैं। लौह उपकरणों में कृषि उपकरणों की अपेक्षा युद्धास्त्रों की संख्या अधिक है। इस प्रकार उत्तरी भारत के विपरीत दक्षिण भारत में लौह युग पाषाणकाल के तुरन्त बाद प्रारंभ हो जाता है।
 

वृहदपाषाणकाल :- 
तत्पश्चात् दक्षिण भारत में महापाषाणकाल / वृहदपाषाणकाल (Megalithic Age) की शुरूआत हुई महापाषाणकाल की सूचना हमें उनकी यथार्थ बस्तियों से कम तथा उनकी कब्रों से ज्यादा मिलती है। ये कब्रें रिहायशी इलाकों से बाहर, वृत्ताकार या चौकोर होती थीं, जिनके ऊपर गोल पत्थर व भीतर आवश्यकता की वस्तुएं रखी जाती थीं, जिनमें लौह उपरकरण भी होते थे। उदाहरणार्थ अदिचनल्लूर व महुरझारी से प्राप्त करें। कब्रगाह मुख्यतः दो प्रकार के थे- पिट्टबरीयल (आंशिक शवाधान) एवं शिष्टबरीयल (पूर्ण शवाधान)
 

ताम्र निधान संस्कृति
 

ताम्र संचय का सबसे प्रथम साक्ष्य 1822 ई. में कानपुर (उत्तर प्रदेश) के पास बिदुर से ताम्र मत्स्य भाले के रूप में प्राप्त हुआ है। परन्तु ताम्र संचय का सबसे बड़ा भण्डार (424 ताम्र उपकरण) मध्य प्रदेश के गंगेरिया नामक स्थान से प्राप्त हुआ है। अब तक ताम्र संचय के कुल 85 स्थान प्रकाश में आए हैं, जिनमें सर्वाधिक स्थल उत्तर प्रदेश से प्राप्त हुए हैं। इटावा (उत्तर प्रदेश) के पास साईपाई नामक स्थान से ताम्र संचय के साथ गरिक मृदभांड भी प्राप्त हुए हैं। इस आधार पर ताम्र संचय का संबंध गैरिक मृदभांड से मान लिया गया।
 

गैरिक मृदभांड संस्कृति (2000 ई. पू. 1500 ई. पू.) :
 

इस संस्कृति का सर्वप्रथम साक्ष्य उत्तर प्रदेश स्थित बदायूं के पास रिसौली और बिजनौर के पास राजपुरपरशु से प्राप्त हुआ है। इस संस्कृति से जुड़े सर्वाधिक स्थल गंगा-यमुना दोआब में स्थित आलमगीरपुर, हस्तिनापुर, अहिच्छत्र, अतरंजीखेड़ा, साईपई नामक स्थान से पाए गए हैं। इस संस्कृति का नामकरण हस्तिनापुर से प्राप्त मृदभांडों के आधार पर किया गया है। यह संस्कृति तांबे के प्रयोग से संबंधित थी।
 

काले व लाल मृदभांड संस्कृति (2400 ई. पू. 100 ई.) :
 

इस संस्कृति का सर्वप्रथम साक्ष्य उत्तर प्रदेश स्थित अतरंजीखेड़ा नामक स्थान से प्राप्त हुआ है। तत्पश्चात् जोधपुर एवं नोह से भी इस संस्कृति के साक्ष्य प्राप्त हुए हैं। काले व लाल मृदभांड उत्तर में रोपण से लेकर दक्षिण में आदिचनाल्लूर तथा पश्चिम में लाखववाल से लेकर पूर्व में पांडु राजार ढीवी तक प्राप्त हुए हैं। इस मृदभांड का भीतरी व बाहरी किनारा काले रंग तथा शेष मृदभांड लाल रंग से चित्रित होता था।
 

चित्रित धूसर मृदभांड संस्कृति
 

इस संस्कृति का सर्वप्रथम साक्ष्य उत्तर प्रदेश स्थित अहिच्छत्र नामक स्थान से प्राप्त हुआ है, जबकि सबसे बड़ा स्थल हरियाणा के पास बुखारी है। यह मृदभांड लोहे के प्रयोग से संबंधित था। इस संस्कृति से संबंधित गंगा-यमुना दोआब से प्राप्त स्थलों से लोहे के उपकरण प्राप्त हुए हैं, परन्तु हस्तिनापुर से लोहे के उपकरण का साक्ष्य प्राप्त नहीं होता है। हस्तिनापुर से चावल तथा अतररंजीखेड़ा से गेहूं व जौ के साक्ष्य प्राप्त हुए हैं। इसके अलावा इस संस्कृति से संबंधित अन्य किसी स्थान से अनाज के साक्ष्य नहीं मिलते हैं। कृषि उपकरणों में जखेरा से लोहे की बनी हंसिया व कुदाली प्राप्त हुई है। भगवानपुरा, दधेरी, नागर व कटपालन से भी इस संस्कृति के साक्ष्य प्राप्त होते हैं, परन्तु यहां से लोहे के उपकरण प्राप्त नहीं होते हैं। अतः इन्हें परवर्ती हड़प्पा संस्कृति का विस्तार माना जाता है।
 

उत्तरी काले पॉलिशदार मृदभांड संस्कृति :
 

इस संस्कृति का सर्वप्रथम साक्ष्य तक्षशिला नामक स्थान से प्राप्त होता है, जो मोर्यकालीन है। उत्तर प्रदेश व बिहार से भी इस संस्कृति के साक्ष्य प्राप्त होते हैं। यह संस्कृति आवश्यक रूप से लोहे से संबंधित थी। कालांतर में द्वितीय नगरीकरण, पक्की ईंटों व आहत मुद्रा से संलग्न हो गई
https://www.vyakarangyan.com/2021/09/chalcolithic-period-general-knowledge.html


भूगोल
हे गाव पुणे शहराच्या पूर्वेस सुमारे ८९ किलोमीटर (५५ मैल) अंतरावर आहे . घोड नदीच्या खालच्या भागात वसलेल्या या प्रदेशात क्रेटेशियस-इओसीन डेक्कन ट्रॅप बेसाल्ट आढळते. [ 1 ]

पुरातत्व स्थळ
इनामगावच्या उत्तरेस सुमारे ३ किलोमीटर (१.९ मैल) अंतरावर सुमारे ५५० मीटर (१,८०० फूट) बाय ४३० मीटर (१,४१० फूट) लांबीचे एक प्राचीन स्थळ आहे. [ 2 ]

या ठिकाणी पाच ढिगारे आहेत. सर्वात मोठ्या ढिगार्याला 'इनामगाव पहिला' असे म्हणतात आणि त्याचे मोठ्या प्रमाणात उत्खनन करण्यात आले आहे आणि त्याच्या पुरातत्वीय शोधांचा अभ्यास करण्यात आला आहे. [ 3 ] हे ठिकाण ३८००-३२०० बीपी (कॅलिब्रेटेड) किंवा १८००-१२०० बीपी दरम्यान वसलेले होते.

सुरुवातीच्या आणि नंतरच्या जोर्वे संस्कृतीला चांगल्या प्रकारे समजून घेण्यासाठी चॅल्कोलिथिक वस्तीचे उत्खनन करण्यात आले . [ 4 ] इनामगाव येथे चॅल्कोलिथिकचे 3 टप्पे आढळतात.

हे उत्खनन त्याच्या विस्तृत आणि पद्धतशीर प्रक्रियेमुळे भारताच्या पुरातत्व इतिहासात एक महत्त्वाचा टप्पा होता. [ 1 ] उत्खननातून अनेक सांस्कृतिक टप्पे उघड झाले ज्यात उशीरा जोर्वे संस्कृती, सुरुवातीचा जोर्वे संस्कृती आणि मालवा संस्कृती यांचा समावेश आहे. पुरातत्वशास्त्रातील निष्कर्ष डेक्कन कॉलेज पदव्युत्तर आणि संशोधन संस्था आणि छत्रपती शिवाजी महाराज वास्तु संग्रहालय यासारख्या विविध संग्रहालयांमध्ये उपलब्ध आहेत . [ 5 ]

सध्याचे सामाजिक जीवन
अधिक जाणून घ्या
या विभागात कोणत्याही स्रोतांचा उल्लेख नाही . ( मार्च २०२२ )
आधुनिक काळातील इनामगाव विकासाच्या मार्गावर आहे. शेती आणि संबंधित व्यवसाय हे इनामगावचे प्रमुख उत्पन्नाचे स्रोत आहेत. घोड नदी सांस्कृतिक आणि सामाजिक इमारतींसाठी अनुकूल आहे. महाराष्ट्र जलसंपत्ती नियामक प्राधिकरणाने इनामगावला पाणी साठवण प्रकल्पांसाठी दोन जलाशय आणि लहान धरणे दिली आहेत. पाणी साठवण्यासाठी हे जलाशय आणि लहान धरणे पाणी साठवण्यास आणि पाण्याची उपलब्धता कमी करण्यास मदत करतात. वस्तीमध्ये सर्व प्रकारचे प्रीस्कूल , प्राथमिक शाळा आणि माध्यमिक शाळा आहेत . न्यू इंग्लिश स्कूल इनामगाव ही एक माध्यमिक शाळा आहे. इनामगावच्या शेतकऱ्यांचा दोन वेगवेगळ्या सहकारी साखर कारखान्यांमध्ये भांडवली हिस्सा आहे . श्रीगोंदा सहकारी साखर कारखाना आणि घोडगंगा साखर कारखाना . औद्योगिक प्रतिष्ठाने जवळ आहेत आणि ग्रामस्थांच्या रोजगारासाठी अनुकूल आहेत. इनामगावला पेट्रोल स्टेशन आणि सामाजिक मेळाव्याचे आयोजन केले जाते . वस्तीला विविध राष्ट्रीय बँकांकडून सेवा दिली जात आहे, तथापि फक्त पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकच उपस्थिती दर्शवते. ग्रामस्थांच्या एकत्रित भांडवली हिस्सा आणि पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या पाठिंब्याने सहकारी संस्था स्थापन झाली आहे, ज्यामुळे गरजू शेतकऱ्यांना गरजू शेतकऱ्यांना गरजूंना मदत मिळते. ही सहकारी संस्था नियामक संस्था गावकऱ्यांनी निवडून दिलेल्या लोकांद्वारे स्थापन केली जाते.

संदर्भ

दत्ता, अन्विता (२००६). "इनामगावच्या चॅल्कोलिथिक लोकांच्या अर्थव्यवस्थेचा एक गंभीर आढावा" . प्राचीन आशिया . १ : १२३. doi : १०.५३३४/aa.०६१११ .

"एक्सपीडिशन मॅगझिन - पेन म्युझियम" . www.penn.museum . २६ मार्च २०२२ रोजी पुनर्प्राप्त .

लुकाक्स, जॉन आर.; रेबेका के. बोगोराड, सुभाष आर. वालिम्बे आणि डोनाल्ड सी. डनबार (सप्टेंबर १९८६). "इनामगाव येथील पॅलिओपॅथॉलॉजी: पश्चिम भारतातील हडप्पा नंतरचे कृषी गाव". अमेरिकन फिलॉसॉफिकल सोसायटीची कार्यवाही . १३० (३): २८९– ३११. जेएसटीओआर ९८६८२८ . पीएमआयडी ११६२०९५६ .   

सांकलिया, एचडी; डी. अन्सारी आणि एमके धावलिकर (१९७१). "इनामगाव: पश्चिम भारतातील एक चॅल्कोलिथिक वसाहत" (पीडीएफ) . आशियाई दृष्टीकोन . चौदावा : १४०.

"इनामगाववरील ताज्या बातम्या आणि माहिती" . २ फेब्रुवारी २०१६ रोजी मूळ वरून संग्रहित . १ जुलै २०१८ रोजी पुनर्प्राप्त .
esakal.com
Pune News : इनामगाव येथील प्राचीन उत्खनन स्थळाच्या संरक्षणासाठी राज्य शासनाकडून साडे सहा कोटी रुपये निधी
दत्ता कदम
5–6 minutes
Six and half crore rupees from state government for protection ancient excavation site InamgaonSakal

Updated on: 

20 September 2023, 7:29 pm IST

मांडवगण फराटा : महाराष्ट्रातील आद्य शेतकऱ्यांची वसाहत उत्खननात सापडलेल्या इनामगाव (ता. शिरूर ) येथील जागा संरक्षित करण्यासाठी महाराष्ट्र शासनाने मोठा निधी उपलब्ध करून दिला असल्याची माहिती ग्रामसंस्कृती दर्शन प्रकल्प समितीचे अध्यक्ष तुकाराम मचाले यांनी दिली.

प्राचीन संस्कतीचा ठेवा असलेल्या इनामगाव येथील जागतिक किर्तीच्या उत्खनन स्थळावर, संशोधन ठिकाणाच्या संरक्षण व संवर्धनासाठी, उत्खनन क्षेत्राभोवती संरक्षक भिंत बांधण्यासाठी महाराष्ट्र शासनाच्या एकछत्र योजनेतून सहा कोटी एकोणचाळीस लक्ष पन्नास हजार पाचशे आठहत्तर रुपये खर्चाच्या अंदाजपत्रकास प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे.

राज्याचे सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी यासाठी पुढाकार घेतला आहे. राज्यशासनाच्या एकछत्र योजनेतून अंदाजपत्रकास मान्यता मिळाली असून येथील गावकऱ्यांच्या अनेक वर्षांपासूनच्या मागणीला यश आले आहे.

शिरूर पासून सुमारे ४० किलोमीटर अंतरावर इनामगाव हे गाव आहे. या ठिकाणी १९६७ मध्ये झालेल्या संशोधनातून अतिप्राचीन काळात मानवी जीवनाची सुरवात कशी झाली त्या काळचे नागरिक, त्यांचे जनजीवन, राहणीमान, शेती, संस्कृती कशा प्रकारची होती तसेच या ठिकाणी केलेल्या उत्खननात जुन्या काळातील अनेक भांडीही सापडली होती आणि तेथून पुढे इनामगाव हे गांव प्रकाशझोतात आले होते.

तेव्हापासून गावकन्यांनी या संस्कृतीचे जतन व्हावे, यासाठी निधी उपलब्ध व्हावा अशी मागणी केली होती. त्या मागणीला आता काही प्रमाणात यश आल्याचे दिसून येत आहे. गावातून दोन किलोमीटरचा रस्ता पार केल्यानंतर घोड नदीच्या किनारी या ऐतिहासिक आणि पुरातन संस्कृतीच्या खाणागुणा आजही दिसून येत आहेत.

इनामगाव आणि परिसरात सतत पडणाऱ्या दुष्काळामुळे व बदलत्या हवामानामुळे येथे अस्तित्वात असणारी प्राचीन मानवी संस्कृती नष्ट झाली होती. हजारो वर्षांचे हे अवशेष काळाच्या ओघात खाली गाडले गेले.

१९६७ मध्ये ही मानवी संस्कृती गावकऱ्यांच्या हाती लागली. त्यातूनच पुढे १९६७ ते १९८२ अशी सलग १५ वर्षे पुणे विद्यापीठ व डेक्कन कॉलेजच्या पुरातत्त्व विभागाच्या वतीने या टेकडयांचे उत्खनन करून संशोधन झाले.

त्या काळची भांडी, कालव्याद्वारे पाणी नेऊन शेती करण्याची अत्याधुनिक पध्दत, शिकारीसाठीची हत्यारे, मृत व्यक्तींना रांजणाच्या आकाराच्या भांडयात दफन करण्याची पद्धत यावरून ही संस्कृती किती प्रगत होती याचे पुरावे हाती लागले होते. तेथून पुढे देशभरातील संशोधकांच्या नजरा इनामगाव कडे वळल्या इनागावकडे अभ्यासक आणि संशोधकांची रांग लागली.

याठिकाणी शोध लागलेल्या संस्कृतीचे आर्य आणि द्रविड संस्कृतीबरोबर व्यापारी संबंध आणि देवाणघेवाण होती हे ही सिद्ध झाले आहे. ही मानवी वसाहत सुमारे ३००० वर्षापूर्वीची व ताम्रपाषाणयुगीन असल्याचा निष्कर्ष निघाला.

महाराष्ट्रातील आद्य शेतकन्यांची पहिली वसाहत याच ठिकाणी असल्याचे निष्पन्न झाले. मातृपितृ देवतांच्या मूर्ती व स्वस्तिक चिन्ह त्या काळीही अस्तित्वात होते यांचा उलगडा झाला. घोड नदीचे विस्तीर्ण पात्र, त्याकडेला असणाऱ्या मातीच्या उंच सखल टेकडया, विविध रंगी पक्ष्यांचे थवे, निसर्गरम्य परिसर हे सर्व पाहिल्यावर ही जागा मानवी वसाहतीसाठी किती योग्य होती यांचा अंदाज येतो.

विविध दंतकथांनी प्रसिद्ध असलेली व अस्तित्वात असणाऱ्या कुलदेवतांचे साजरे होणारे सण, वसाहतीच्या ठिकाणी आज सापडणारे पुरातन काळातील मातीच्या भांडयांचे तुकडे पाहताना मन भारावून जाते. उत्खननात सापडलेल्या वस्तू १९८२ मध्ये लंडन येथे भारवलेल्या जागतिक प्रदर्शनात ठेवल्या होत्या. पुण्यातील डेक्कन कॉलेज, मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज संग्रहालय व नगर येथील संग्रहालयात येथील वस्तू जतन करून ठेवल्या आहेत. आजही या ठिकाणी देश-विदेशातील हजारो संशोधक भेटी देऊन या ठिकाणची माहिती घेताना दिसत आहेत.

'पुरातत्त्व'च्या इतिहासात अनन्यसाधारण महत्त्व -

येथे शेतात वेगवेगळी धान्ये घेतली जात होती. मृतांचे दफन करण्याची वेगळी पद्धत त्याचबरोबर महाराष्ट्रातील पहिली कालव्याद्वारे शेतीला पाणी देण्याची पद्धत याच ठिकाणी अस्तित्वात होती. अस्थी कुंभात दफन करण्याच्या येथील पद्धतीमुळे यांचा द्रविड संस्कृतीशीही संबंध येतो. तसेच या उत्खननात मातृदेवता, पितृदेवता या मूर्ती मिळाल्या आहेत. या उत्खनन व संशोधनामुळे महाराष्ट्राच्या आद्य शेतकऱ्यांच्या जीवनाचे अनेक पैलू उजेडात आले आहेत. त्यामुळे येथील उत्खननास भारतीय पुरातत्वाच्या इतिहासात अनन्यसाधारण महत्त्व आहे.

जागतिक वारसा म्हणून मान्यता मिळावी !

गेल्या अनेक वर्षांपासून हे अतिप्राचीन ठिकाण, येथील संस्कृती, उत्खननात सापडलेली भांडी यांचे जतन आणि संवर्धन व्हावे अशी ग्रामस्थ, अभ्यासक, संशोधक यांची मागणी होती. या साठी १९८२ सालापासून ग्रामस्थांचे प्रयत्न सुरु होते. सन १९८४ मध्ये या ठिकाणाला राज्य संरक्षित स्थळ म्हणून दर्जा मिळाला.

पुढे देश विदेशातील हजारो संशोधक या ठिकाणाला भेट देऊन गेले. आता ग्रामस्थांसह सर्वांच्याच मागणीचा विचार करून शासनाने एकछत्र योजनेतून सुमारे साडे सहा कोटी रुपयांच्या अंदाजपत्रकास मान्यता दिली आहे. यासाठी मदत करणाऱ्या सर्वांचे आभार आणि यापुढे शासनाकडून या ठिकाणास जागतिक वारसा म्हणून मान्यता मिळावी अशी आमची मागणी आहे - तुकाराम मचाले ( इतिहास अभ्यासक व सामाजिक कार्यकर्ते, इनामगाव )


pudhari.news
पुणे : इनामगाव येथील उत्खनन स्थळ दुर्लक्षित
backup backup
3–4 minutes
Published on: 

03 Feb 2022, 10:28 am

Updated on: 

03 Feb 2022, 10:28 am

मांडवगण फराटा; पुढारी वृत्तसेवा : महाराष्ट्रातील आद्य शेतकऱ्यांची वसाहत, शेतीला कालव्याद्वारे पाणी देण्याची पहिली पद्धत आणि स्वस्तिकचे भांडे हे सर्व सापडले होते इनामगाव येथील उत्खननस्थळी; मात्र सध्या हे ठिकाण पूर्णपणे दुर्लक्षित झाले आहे. या उत्खनन स्थळाला संरक्षित क्षेत्र घोषित करण्याची मागणी इनामगाव ग्रामस्थांनी केली आहे. (पुणे उत्खनन स्थळ)

पुण्यापासून १०० किलोमीटर व शिरूरपासून अवघ्या ४० किलोमीटरवर असलेले इनामगाव हे तालुक्यातील शेवटचे गाव आहे. घोड नदीतीरावर असलेले हे दुष्काळी गाव आहे.  इनामगाव येथे सन १९६८ ते १९८३ च्या दरम्यान घोड नदीतीरावर असलेल्या पाच टेकड्यांवर उत्खनन करण्यात आले. हे उत्खनन डॉ. ह. धो. सांकलीचा, डॉ. म. के. ढवळीकर, डॉ. झै. अन्सारी या शास्त्रज्ञांच्या डेक्कन कॉलेजच्या पुरातत्त्व विभागाच्या वतीने करण्यात आले होते. (पुणे उत्खनन स्थळ)

या उत्खननात ताम्रपाषाणयुगीन मानवी संस्कृतीचे अवशेष सापडले होते. महाराष्ट्रातील आद्य शेतकऱ्यांची वसाहत याच ठिकाणी होती. या उत्खननात हत्ती, रानटी बैल, रानमेंढी, शेळी आदींसह सस्तन प्राण्यांचे जीवाष्म आढळले होते. आद्य शेतकऱ्यांची घरे, हत्यारे यामध्ये (तासण्या, भोक पडण्याचे हत्यार, छिलके, टोकदार हत्यारे), वेगवेगळ्या प्रकारची मातीची भांडी (लाल किंवा लाल-काळी), शेतीची अवजारे आदी आढळून आली होती. हा काळ तब्बल ४० ते ५० हजार वर्षांपूर्वीचा आहे. (पुणे उत्खनन स्थळ)

मात्र सध्या गेल्या अनेक वर्षांपासून हे उत्खनन स्थळ शासकीय अनास्थेमुळे पूर्णपणे दुर्लक्षित झाले आहे. तेथे मोठ्या प्रमाणावर काटेरी झुडपे उगवली आहेत. या ठिकाणी स्थानिक सामाजिक कार्यकर्ते तुकाराम मचाले यांनी संरक्षित स्थळ म्हणून दर्जा मिळावा, तसेच हे स्थळ विकसित करण्यात यावे यासाठी शासन दरबारी पाठपुरावा सुरू केला आहे. (पुणे उत्खनन स्थळ)

वस्तू व अवशेषांचा ब्रिटन येथील प्रदर्शनात सहभाग
इनामगाव येथील उत्खननातील अवशेष व वस्तू डेक्कन कॉलेज पुरातत्त्व संग्रहालय, श्री छत्रपती शिवाजी महाराज संग्रहालय, अहमदनगर व भारतातील अनेक विद्यापीठांमध्ये जतन करून ठेवण्यात आल्या आहेत. या उत्खननातील वस्तू व अवशेषांचा १९८२ साली ग्रेट ब्रिटन येथे जागतिक प्रदर्शनामध्ये सहभाग होता.

 द्रविड संस्कृतीशी संबंध झाला होता उघड
त्याकाळी शेतात वेगवेगळी धान्ये घेतली जात होती. मृतांचे दफन करण्याची वेगळी पद्धत, त्याचबरोबर महाराष्ट्रातील शेतीला कालव्याद्वारे पाणी देण्याची पहिली पद्धत याच ठिकाणी अस्तित्वात होती. येथील अस्थी कुंभात दफन करण्याच्या पद्धतीमुळे यांचे द्रविड संस्कृतीशीही संबंध होते. तसेच या उत्खननात मातृदेवता, पितृदेवता या मूर्ती मिळाल्या आहेत. या उत्खनन व संशोधनामुळे महाराष्ट्राच्या आद्य शेतकऱ्यांच्या जीवनाचे अनेक पैलू उजेडात आले आहेत. त्यामुळे येथील उत्खननास भारतीय पुरातत्त्वच्या इतिहासात अनन्यसाधारण महत्त्व आहे.


chandrashekhara.wordpress.com
इंडियन मेल्टिंग पॉट
Posted by chandrashekhara
14–17 minutes


दख्ख:नच्या पठारावर वाहणार्‍या भीमा या कृष्णेच्या प्रमुख उपनदीला, घोड ही नदी, दौंड गावाजवळ येऊन मिळते. या घोड नदीच्या काठावर आणि पुण्यापासून सुमारे 85 किमी अंतरावर, ‘इनामगाव‘ या नावाचे एक गाव वसलेले आहे. या इनामगावापासून सुमारे 3 मैल अंतरावर असलेल्या साधारण 65 एकर (500 X 500 m) एवढ्या पसार्‍याच्या अर्धवर्तुळाकार आवारात, मातीच्या 5 छोटेखानी टेकड्या किंवा उंचवटे दृष्टीस पडतात. 5 उंचवट्याचाहा परिसर, पुरातत्त्व शास्त्रज्ञांच्या दृष्टीने एक अत्यंत महत्त्वाचा असा आहे. पुण्यातील डेक्कन कॉलेज या संस्थेतील पुरातत्त्व विभागाच्या शास्त्रज्ञांनी,या परिसरात मोठे विस्तृत प्रमाणातील उत्खनन, 1968 ते 1982 या 14 वर्षाच्या कालखंडात केलेले आहे.

इनामगाव येथील उत्खनन झालेले हे स्थळ मोठे वैशिष्ट्यपूर्ण असे आहे. इतिहासकार भारताच्या गत कालाचे दोन भाग मानतात. यापैकी शाक्यमुनी सिद्धार्थ गौतम बुद्ध याच्या कालापासून (इ.स.पूर्व 563 to 486 ) पुढच्या कालखंडाचे, ऐतिहासिक खंड असे नामानिधान केले जाते तर या पूर्वीच्या कालखंडाला,पूर्व–ऐतिहासिक कालखंड या नावाने ओळखले जाते. याचे कारण असे आहे की गौतम बुद्धाच्या कालापासूनच्या पुढच्या इतिहासाबद्दल,कोणत्या ना कोणत्या स्वरूपातला,लिखित पुरावा उपलब्द्ध झालेला आहे. मात्र या आधीच्या कालखंडाच्या इतिहासाबद्दल कोणताच लिखित पुरावा उपलब्ध नाही. इनामगाव या स्थळाचे वैशिष्ट्य हे आहे की ऐतिहासिक कालखंड आणि त्या आधीचा,पूर्व–ऐतिहासिक कालातील सिंधू–सरस्वती संस्कृतीचा कालखंड,या दोन्हीना जोडणार्‍या कालात(bridges the pre-historic and historic periods), इनामगाव उत्खनन स्थळ, हे सातत्याने एक मानवी वसतीस्थान राहिलेले आहे.



कच्छ मधील  धोलावीरा येथील उत्खननात मिळालेले इ.स.पूर्व 1600 मधील वर्तुळाकार आकाराच्या  घराचे अवशेष

इनामगाव येथील उत्खननावरून दिसून येते की या स्थानी,इ.स.पूर्व 1600 ते इ.स.पूर्व 700 या कालखंडात सातत्याने मानवी वस्ती होती. त्यामुळे असे म्हणता येते की इ.स.पूर्व 1600च्या सुमारास विलयास गेलेली भारताच्या वायव्य भागातील सिंधू–सरस्वती संस्कृती आणि गौतम बुद्धांचा (इ.स.पूर्व 600) काल यामधील कालखंडाचा इनामगाव हा एक दुवा आहे. आता सर्वसाधारणपणे असे मानले जाते की मूर्तीपूजक सिंधू–सरस्वती संस्कृतीची जागा,अग्नीपूजक वैदिक संस्कृतीने इ.स.पूर्व 1900 ते इ.स.पूर्व 1600 या कालखंडात निदान उत्तर भारतात तरी घेतली होती. त्यामुळे इनामगाव येथील उत्खनन या दृष्टीनेही महत्त्वाचे मानले जाते.

डेक्कन कॉलेजच्या पुरातत्त्व शास्त्रज्ञांनी इनामगाव मधील मानवी वस्तीचे तीन कालखंडात विभाजन केलेले आहे. यापैकी पहिल्या कालखंडाला ((1600-1400 इ.स.पूर्व) ‘माळवा संस्कृती‘, 1400-1000 इ.स.पूर्व या कालखंडाला ‘पूर्व जोरवे संस्कृती‘ आणि 1000-700 इ.स.पूर्व या कालखंडाला ‘उत्तर जोरवे संस्कृती‘ या नावाने ते ओळखतात.



इनामगाव येथील उत्खननात मिळालेले माळवा संस्कृतीकालीन वर्तुळाकार आकाराचे  व जमीनीखाली  तळ असलेले घर

पुरातत्त्व शास्त्रज्ञ आता असे मानतात की सिंधू–सरस्वती संस्कृतीतील वस्त्या तेथे उपलब्ध असलेले जलस्रोत हळूहळू आटत गेल्याने पूर्वेकडे व दक्षिणेकडे सरकू लागल्या व यापैकी काही वस्त्या मध्य प्रदेशातील माळवा भागात स्थिरावल्या होत्या. इनामगाव मध्ये सर्वात प्रथम वस्ती करण्यास आलेले माळवा संस्कृतीतील मानव,हे या माळवा भागाकडून आलेले होते. या वरून असा निष्कर्ष काढणे फारसे चूक ठरणार नाही की मूळ सिंधू–सरस्वती खोर्‍यातून आलेल्या लोकांच्या वस्त्यांपैकी काही वस्त्या पुढे आणखी दक्षिणेला म्हणजे दख्खनच्या पठारावर सरकल्या व इनामगाव सारख्या अनेक ठिकाणी येऊन स्थिरावल्या,किंबहुना इनामगाव मधील माळवा संस्कृतीतील वस्ती ही मूलत: सिंधू–सरस्वती संस्कृतीतील लोकांची होती. इनामगाव येथे उत्खनन झालेल्या माळवा संस्कृती घरांमध्ये सापडलेल्या आणि स्त्रीफलोधारणेचे प्रतीक असलेल्या स्त्री मूर्तींचे याच प्रकारच्या सिंधू–सरस्वती संस्कृतीमधील वस्त्यांमध्ये सापडलेल्या मूर्तींशी असलेले साधर्म्य लक्षात घेतले तर हा निष्कर्ष योग्य आहे असेच वाटते.



  इनामगाव येथे सापडलेले पूर्व जोरवे संस्कृतीतील चौकोनी आकाराचे व जमीनीखाली तळ असलेले घर 

इनामगाव मध्ये यानंतर म्हणजे 1400-1000 इ.स.पूर्व मध्ये किंवा पूर्व जोरवे संस्कृती कालखंडात स्थायिक झालेले लोक, प्रवरा–गोदावरी खोर्‍यांतून आलेले किंवा स्थानिक लोक होते. पुरातत्त्व शास्त्रज्ञांनी इनामगाव मधील उत्खननावरून काढलेला सर्वात महत्त्वाचा निष्कर्ष असा आहे की मालवा संस्कृती आणि पूर्व जोरवे संस्कृती या दोन्ही इनामगावमध्ये बर्‍याच मोठ्या कालखंडासाठी एकत्रपणे नांदत होत्या.

पुरातत्त्व विभागाचे शास्त्रज्ञ उत्खनन करत असलेल्या बहुसंख्य स्थानांवर भूतकाळातील एका पाठोपाठ एक होऊन गेलेल्या सांस्कृतिक कालांचे अवशेष हे बहुधा उभ्या पातळीमध्ये, एकाच्या डोक्यावर एक या पद्धतीने साठत गेलेले असतात. त्यामुळे जितके खोल खणत जावे तितके आपण जास्त जास्त गतकालात पोचत असतो. परंतु इनामगावचे वैशिष्ट्य हे आहे की येथे होऊन गेलेल्या तिन्ही संस्कृतींचे अवशेष हे एकाच पातळीवर विखुरलेले आढ्ळतात. त्यामुळे एका ठिकाणी घेतलेल्या खड्ड्यात फक्त एकाच संस्कृती कालाचे अवशेष आढळतात.

अमेरिकन लोक खूप वेळा त्यांच्या म्हणजे अमेरिकन संस्कृतीला, वितळवून एकवटणार्‍या हंड्याची (melting pot) उपमा देत असतात. त्यांच्या मताने अमेरिकेत बाहेरून सतत येत असलेल्या नाना वंशांच्या, खंडांमधल्या आणि जातीधर्माच्या स्थलांतरितांच्या एकत्रीकरणामुळे अमेरिकेची अशी खास आणि वैशिष्ट्यपूर्ण संस्कृती निर्माण झाली आहे. येणारा प्रत्येक स्थलांतरित या संस्कृतीच्या हंड्यातील उकळणार्‍या रसायनाला आपले खास असे वैशिष्ट्य बहाल करत त्या रसायनात वितळून जात असतो. इनामगाव येथील उत्खननावरून शास्त्रज्ञांनी काढलेला आणि वर उल्लेख केलेला निष्कर्ष बघता मला असे कुतूहल वाटते आहे की इनामगावला असेच काहीसे झाले असेल का? सिंधू–सरस्वती खोर्‍यांतून येणारी उत्तर भारतीय संस्कृती व या भागात आधीच स्थायिक झालेल्या दक्षिण भारतीयांची संस्कृती या अशाच एकमेकात मिसळून गेल्या असतील का? काही कालापूर्वी CSIR या भारतीय संस्थेने प्रसिद्ध केलेल्या एका अभ्यासात, दख्खनच्या पठारावर आणि दक्षिणेकडे स्थायिक झालेले लोकांनी मूलतः मलै द्वीपकल्पावरून तेथे स्थलांतर केले असावे असा अंदाज बांधलेला होता. हे लोक आणि सिंधू–सरस्वती संस्कृती मधून आलेले लोक हे इनामगाव सारख्या अनेक स्थानांवर एकत्र मिसळून गेले असतील, का त्यांनी आपापल्या संस्कृती अलग ठेवल्या असतील?

गेल्या हजार पंधराशे वर्षांमध्ये रचल्या गेलेल्या काही ग्रंथांचा आधार घेतला (महाभारत, कौटिल्य अर्थशास्त्र, मनुस्मृती), तर असे दिसते की वैदिक किंवा नंतर हिंदू धर्माचे पालन करत असलेला भारतीय समाज, सर्वव्यापी असणार्‍या एका ‘जातीव्यवस्था‘ किंवा चतुर्वर्ण या नावाने ओळखल्या जाणार्‍या सामाजिक बंधात संपूर्णपणे जखडून गेला होता व आहे. या जातीव्यवस्थेचे महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे रोटीबेटी व्यवहार, फक्त आपल्या जातीपुरता मर्यादित ठेवणे (endogamous) हे होते किंवा आहे. मग असे जर असले तर इनामगाव सारख्या स्थानावर या जात किंवा वर्ण व्यवस्थेचे पालन होत असेल? का उत्तर भारतीय आणि दख्खनच्या पठारावरील स्थायिक लोक यांच्यात रोटीबेटीचे व्यवाहार चालू होऊन एक नवा भारतीय समाज निर्माण झाला असेल?

या प्रश्नांची उत्तरे देणे कोणाला शक्य होईल असे मला तरी वाटले नव्हते, परंतु हैद्राबाद येथील CSIR-Centre for Cellular and Molecular Biology आणि Harvard Medical School या दोन संशोधन संस्थांमध्ये कार्यरत असणार्‍या शास्त्रज्ञांच्या एका गटाने एकत्रपणे किंवा सहकार्याने केलेल्या एका अभ्यास उपक्रमाच्या निष्कर्षांवरून हे उत्तर देणे आता शक्य झाले आहे. प्रिया मूरजानी, कुमारसामी थांगराज, निक पॅटरसन, मार्क लिपसन, पो–रु–लोह, पेरियासामी गोविंदराज, बॉनी बेर्जर, डेव्हिड राइच आणि लालजी सिंह ( Priya Moorjani, Kumarasamy Thangaraj, Nick Patterson, Mark Lipson, Po-Ru Loh, Periyasamy Govindaraj, Bonnie Berger, David Reich and Lalji Singh) या शास्त्रज्ञांनी आपल्या अभ्यास उपक्रमाचे निष्कर्ष, ‘Genetic Evidence for Recent Population Mixture in India’ या नावाने लिहिलेल्या संशोधन प्रबंधात‘American Journal of Human Genetics.‘ या मासिकात प्रसिद्ध केले आहेत.

जनुकशास्त्राच्या आधाराने केलेल्या या अभ्यास उपक्रमाचा हा अहवाल हे स्पष्टपणे सांगतो:

“भारतात आढळणारे बहुतेक जनुकीय गट हे दोन एकमेकापासून भिन्न असलेल्या मानवी जनसमुदायांच्या मिश्रणातून निर्माण झालेल्या जनुकीय गटाचे वंशज असल्याचे दिसते: मध्य एशिया, मध्यपूर्व, कॉकेशस पर्वत रहिवासी आणि युरोपियन यांच्या वंशमिश्रणातून आलेले “पूर्वज उत्तर भारतीय (ए एन आय)” आणि भारतीय उपखंडाबाहेरील कोणत्याही जनुक गटाशी साधर्म्य नसलेले “पूर्वज दक्षिण भारतीय (ए एस आय)” हे ते दोन भिन्न जनुकीय गट आहेत.”

“ Most Indian groups descend from a mixture of two genetically divergent populations: Ancestral North Indians (ANI) related to Central Asians, Middle Easterners, Caucasians, and Europeans; and Ancestral South Indians (ASI), not closely related to any groups outside the subcontinent.”

या अभ्यास प्रकल्पावर कार्य करणार्‍यांना असे आढळून आले की त्यांनी रक्त चाचणी केलेल्या प्रत्येक भारतीय व्यक्तीच्या जनुकीय भूतकालाचा सर्वात पूर्व संबंध, एकतर युरोप–एशिया मधून आलेला पहिला गट किंवा मूळ आफ्रिकेतून आलेला दुसरा गट यांच्याशी निर्विवादपणे जोडता येत असला तरी नंतर या दोन्ही गटांचे आपापसात रोटीबेटी व्यवहार झाल्याने एकमेकाशी जनुकीय मिश्रण होऊन जो एक नवीन एकात्मक जनुकीय गट झाल्याचे लक्षात येते त्याच्याशी सुद्धा या सर्व भारतीय व्यक्तींचा स्पष्ट जनुकीय संबंध असल्याचे सिद्ध होते. मात्र गतकालातील एका अज्ञात क्षणापासून पुढे,याच भारतीय व्यक्तींचे जनुकगट, भाषा, धर्म आणि अदिवासी समाज गट यांच्यावर आधारित असे भिन्न भिन्न गट होत जाऊन आता त्यांचे 4635 भिन्न जनुकीय गट तयार झाले आहेत.



याचा अर्थ असा होतो की इनामगाव सारख्या अनेक मानवी वस्तींमध्ये उत्तर भारतीय व दक्षिण भारतीय यांच्यामध्ये वाढत गेलेल्या रोटीबेटी व्यवहारामुळे निर्माण झालेले भारतीय एकवटणार्‍या हंड्यातील उकळते जनुकीय रसायन, गतकालातील या अज्ञात क्षणापासून पुढे एकदम गोठून गेले व भारतीय समाजाचे भाषा, धर्म,जात आणि अदिवासी संस्कृती यांच्यानुसार विभाजन होत राहिले. आता प्रश्न असा उभा राहतो की हा अज्ञात क्षण गतकालात कधी आला असेल? तो इनामगावमध्ये मानवी वस्ती होती त्या कालाच्या आधी आला की नंतर?

या प्रकल्पावर कार्य करणार्‍या शास्त्रज्ञांना या प्रश्नाचे स्पष्ट उत्तर मिळू शकलेले आहे. ते म्हणतात की पूर्वज उत्तर भारतीय व पूर्वज दक्षिण भारतीय यांच्यातील जनुकीय मिश्रण हे सुमारे 4200 वर्षांपूर्वी (इ.स.पूर्व 2200) किंवा उत्तर हडप्पा संस्कृतीकालात सुरू झाले. या कालापासून पुढची 2100 वर्षे म्हणजे 1900 वर्षांपूर्वीपर्यंत (इ.स.पहिले शतक) हे जनुकीय मिश्रण अबाधितपणे चालू राहिले. या सामाजिक बदलाबद्दल हा अहवाल म्हणतो:

” हा 2100 वर्षांचा काल हा एक महत्त्वाचा संक्रमणकाल होता. या कालात सिंधू संस्कृतीतील नागरीकरण विलयास गेले. गंगा खोर्‍यातील जनसंख्या सतत वाढत राहिली आणि भारतीय–युरोपियन भाषागट आणि वैदिक धर्म हे उदयास आले.”

“It was a time of profound change, characterised by the de-urbanisation of the Indus civilisation, increasing population density in the Gangetic system, and the likely appearance of Indo-European languages and Vedic religion.”

या 2100 वर्षाच्या संक्रमण कालानंतर अकस्मातपणे ही जनुकीय मिश्रण प्रक्रिया संपूर्णपणे थांबली किंवा एकवटणारा हा हंडा गोठून गेला. या अहवालाप्रमाणे जनुकीय प्रक्रिया थांबण्याचा हा क्षण इ.स. पहिल्या शतकामध्ये आला.

ग्रीक इतिहासकार मेगॅस्थेनिसने साधारण इ.स.पूर्व 300 मधे लिहिलेल्या आपल्या इंडिका या ग्रंथात भारतातील जाती किंवा वर्ण व्यवस्थेचा उल्लेख केलेला आहे त्याचप्रमाणे यानंतरच्या कालात लिहिल्या गेलेल्या कौटिल्याच्या अर्थशास्त्रात आणि लेखन काल अचूक रित्या ज्ञात नसलेल्या महाभारतात सुद्धा चतुर्वर्ण व्यवस्थेचा उल्लेख आहे. हे सर्व ग्रंथ वर उल्लेख केलेल्या जनुकीय मिश्रण प्रक्रिया थांबण्याच्या कालाच्या 200 ते 300 वर्षे आधी लिहिले गेले असल्याने आपल्याला एक अत्यंत रोचक असा निष्कर्ष काढणे शक्य आहे. या निष्कर्षाप्रमाणे जरी चतुर्वर्ण व्यवस्थेला अधिकृतता इ.स.पूर्वी काही शतके प्राप्त झालेली असली तरी सर्वसाधारण भारतीय समाज हा अजूनही एकसंध होता व त्यांच्यात रोटीबेटीचे व्यवहार पुढे काही शतके तरी चालूच राहिले होते. ( आपण असे मानतो की मनुस्मृती या ग्रंथात चतुर्वर्ण व्यवस्थेचे नियम प्रथम लिहिले गेले. या अहवालाप्रमाणे मनुस्मृती हा ग्रंथ ही जनुकीय मिश्रण प्रक्रिया थांबल्याच्या किंवा इ.स. पहिले शतक या कालानंतर लिहिला गेलेला आहे.)

जनुकशास्त्राचा कोणताही अभ्यासक आपल्याला सांगू शकेल की वर उल्लेख केलेला एकवटणारा जनुकीय हंडा गोठून जाणे ही बाब कोणत्याही समाजाच्या भविष्यकालाच्या दृष्टीने हितावह अशी बाब असू शकत नाही. या बाबतीत हा अहवाल म्हणतो:

” भारतातील सध्याच्या पिढीत जे अनुवंशिक आणि जनुकीय रोग मोठ्या प्रमाणात आढळून येत आहेत त्यांचे वाढलेले प्रमाण मागच्या 1900 वर्षे सतत झालेल्या जाती अंतर्गत विवाहांमुळे (endogamous) असले पाहिजे.”

“An important consequence of these results is that the high incidence of genetic and population-specific diseases that is characteristic of present-day India is likely to have increased only in the last few thousand years when groups in India started following strict endogamous marriage.”

इनामगावकडे आपण परत वळूया. इनामगाव येथील मानवी वस्ती ही भिन्न असलेल्या मानवी संस्कृतीचे एकत्रीकरण करणारा एक खराखुरा ‘वितळवणारा हंडा‘ होता आणि अशा शेकडो इनामगावांच्या आधारावर एकत्रीकरण झालेली नवीन आधुनिक भारतीय संस्कृती आणि लोक उदयास आले असे म्हणणे वावगे ठरू नये.

शेवटी आपल्याला माहीत असलेल्या ऐतिहासिक आणि पूर्व–ऐतिहासिक घटनांचा संबंध या अहवालाशी कसा लावता येतो ते आपण पाहूया.

इ.स.पूर्व 10000 वर्षांपासून वायव्येकडून भारतीय द्वीपकल्पात स्थलांतरितांचे आगमन सतत होत आलेले आहे. या स्थलांतरितांनी आपली संस्कृती सिंधू–सरस्वती खोर्‍यांत स्थापन केली. ही संस्कृती इ.स.पूर्व 2000 पर्यंत अबाधित राहिली. या लोकांचा दख्खनच्या पठारावर राहणार्‍या आणि मूलतः मलै द्वीपकल्प किंवा अंदमान–निकोबार बेटे येथून आलेल्या लोकांशी फारसा काहीच संबंध न आल्याने त्यांच्यात रोटीबेटीचे व्यवहार झाले नाहीत व त्यांची संस्कृती दख्खनच्या पठारावरील लोकांपेक्षा भिन्न राहिली. या अहवालात ही गोष्ट स्पष्टपणे नमूद करण्यात आली आहे की पूर्वज उत्तर भारतीय व पूर्वज दक्षिण भारतीय यांच्यामधील जनुकीय मिश्रण या कालापर्यंत झालेले आढळून येत नाही.

सिंधू–सरस्वती खोर्‍यांतील जलस्त्रोत जसजसे आटू लागले तेंव्हा येथील रहिवाशांनी पूर्वेकडे आणि दक्षिणेकडे स्थलांतर चालू केले. या कालात इनामगाव सारख्या अनेक वस्त्या निर्माण झाल्या असणार. इनामगाव मध्ये मालवा संस्कृती आणि पूर्व जोरवे संस्कृती या दोन्ही बर्‍याच मोठ्या कालखंडासाठी एकत्रपणे नांदत होत्या, हा पुरातत्त्व शास्त्रज्ञांनी काढलेला निष्कर्ष या ठिकाणी म्हणूनच महत्त्वाचा ठरतो. या कालापासून हळूहळू या दोन संस्कृतींमध्ये रोटीबेटी व्यवहार सुरू होऊन एक नवे जनुकीय भारतीय मिश्रण तयार झाले व हे मिश्रण इनामगावमधेच बौद्ध कालापर्यंत (इ.स.पूर्व 600) अधिक अधिक दाट होत गेले.

या अहवालामुळे प्रकट झालेली महत्त्वाची गोष्ट म्हणजे जाती वर्ण व्यवस्थेचे प्राबल्य हे इ.स.पहिल्या शतकानंतर भारतामध्ये रूढ झाले. हा शोध दोन कारणांसाठी विलक्षणच म्हणावा लागेल. प्रथम म्हणजे भारतात किंवा उत्तर–वायव्य भारतात तरी वैदिक संस्कृती, साधारणपणे सिंधू–सरस्वती संस्कृती विलयास गेल्यानंतरच, बहरात आली असली तरीही या अहवालाप्रमाणे त्या पुढची 2000 वर्षे तरी चतुर्वर्ण पद्धत भारतात मोठ्या प्रमाणात प्रचलित नव्हती. दुसरे कारण म्हणजे ज्या धर्माचे सर्व लोकांमधील समानता हे महत्त्वाचे सूत्र होते तो बौद्ध धर्म ऐन बहरात असताना,किंवा इ.स.पहिल्या शतकात,ही चतुर्वर्ण पद्धती संपूर्ण समाजात अतिशय कडक रित्या राबवली जाऊ लागली.

मला हा शोध अतिशय रोचक वाटतो आहे कारण अनेक लोकांची अशी समजूत नव्हे खात्रीच असते की 4000 वर्षे पूर्वी जेंव्हा वैदिक संस्कृती भारतात उदयास आली तेंव्हापासून चतुर्वर्ण पद्धत रूढ झालेली आहे. या अहवालाप्रमाणे ही गोष्ट सत्य नसून प्रत्यक्षात समानतेचा उपदेश करणारा बौद्ध धर्म जेंव्हा सर्वमान्य होता त्या वेळेपासून चतुर्वर्ण पद्धत समाजात रूढ झाली. सारांशाने असे म्हणता येईल की चतुर्वर्ण पद्धत फक्त मागच्या 1900 वर्षांपूर्वी रूढ झालेली आहे.

इनामगाव येथील मानवी वस्ती आणि या सारख्या शेकडो अज्ञात जागा या भारताच्या जनुकीय अभ्यासाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाच्या ठरू शकतात कारण या अनेक इनामगावांमध्येचएका 2000 वर्षांच्या कालखंडात,खरीखुरी भारतीय व्यक्ती व खरा भारतीय जनुकीय गट,जनुकीय मिश्रणाने निर्माण झाला. यानंतर जातीव्यवस्थेचा किंवा चार्तुवर्ण पद्धतीचा एक मोठाच अडसर या जनुकीय मिश्रणापुढे निर्माण झाला व हे जनुकीय मिश्रण आहे तेथेच गोठून गेले.

4 सप्टेंबर 2013

https://chandrashekhara.wordpress.com/2013/09/04/%e0%a4%85%e0%a4%a1%e0%a4%b8%e0%a4%b0/

Inamgaon’s Mysterious 2500-year-old Burial Practices
AUTHOR Kritika Sarda
PUBLISHED 11 June 2017
bookmark icon
BOOKMARK

Till the 1960s, the farmlands around Inamgaon, a small village in the Pune district of Maharashtra, had huge mysterious mounds which had flummoxed locals for generations. When archaeologists, finally began their work here what they found, made history. In Inamgaon, is the unique burial of a 35-year-old male who lived in 1000 BCE. What makes this a stand-out is the fact that this man was buried sitting down in an urn. There are no parallels to this in India.

Over a period of 13 seasons from 1968 to 1983, one of India’s most respected archaeologists Dr MK Dhavalikar conducted a series of excavations that brought to light a lot of new facets to life in Chalcolithic India. Inamgaon was a mid-sized Chacolithic (Bronze age) era settlement that thrived between 1600 BCE -700 BCE. The people who lived here were mostly farmers who had knowledge of making copper implements. A large stash of pottery was also found here. While all this made Inamgaon an important site, what made it a stand-out was the fact that of the 243 burials found here, there were many that could not be explained.

Pottery from Inamgaon at Deccan College Museum
Pottery from Inamgaon at Deccan College Museum | Krutika Haraniya
As excavations began, one of the mounds revealed the burial of a 35-year-old man who was inserted into an urn. The skeletal remains were dated back to 1000 BCE. The urn, shaped like a stout human body with a bulging belly, had four legs and was buried in the courtyard of a five-room house.

Urn Burial with the 35-year old inserted in it along with grave goods such as vessels
Urn Burial with the 35-year old inserted in it along with grave goods such as vessels | Reena Joshi
The identity of the person buried has not been confirmed. Considering the unique nature of the burial, with no parallels within the country, archaeologist Dr Dhavalikar presented two differing views. First, after taking into consideration the big house with a courtyard, he suggested that the person could be a chief and, hence, had been given an elaborate farewell. But after conducting ethnographic research around the area of Inamgaon and finding out that a cattle-keeping community around the area did in fact bury their dead in a seated position (in a pit and not in an urn) he suggested that the burial might have been of a common person belonging to a different clan, whose traditions survive in a small community even today. The urn excavated at Inamgaon also had a painting of a boat. Dhavalikar, once again found echoes of that today - he believed the motif represented the commonly held belief that dead crossed a river in a ferry to reach the next world.

Diorama of Inamgaon Settlement at Deccan College
Diorama of Inamgaon Settlement at Deccan College | Krutika Haraniya
This discovery created quite a stir in the archaeological circles and the famed and unique Inamgaon skeletal remains and grave goods are today on display at the Museum of the Deccan College Post-Graduate and Research Institute, Pune.

In the course of his excavations, Dhavalikar also found a plethora of twin-urn burials, mostly belonging to children below the age group of six. The head and shoulder of the dead were inserted into one urn while the legs were inserted into the other and the urns were sealed mouth to mouth.

Twin-urn burial at Deccan College
Twin-urn burial at Deccan College | Reena Joshi
Another notable burial, are the ones where the feet below the ankles of the dead are deliberately cut. In this case, the dead were buried into pits. The pits had vessels which were kept for the dead. According to Dr Dhavalikar, the practice of cutting off the feet is suggestive of the fear of the dead turning into ghosts. There was also a tradition of burying the dead with their head towards the north and legs towards the south.

Remains of a skeleton with feet missing. This was found at Inamgaon and is kept at Deccan College, Pune
Remains of a skeleton with feet missing. This was found at Inamgaon and is kept at Deccan College, Pune | Krutika Haraniya
The burials at Inamgaon give us some great insights into the life and beliefs of the people who lived in this area over 3000 years ago. The grains found in the vessels along with the burials also give us a sense of what they ate. The diet included barley, wheat, lentil, grass pea and even a few grains of rice.

Urn burials were common across South-East Asian areas like Indonesia during this period. But in most cases, it was the remains of a person, mostly bones, that were inserted into urns. The Inamgaon burial is unique in the context that this is a primary burial, where the complete body of the 35-year old person was buried in an urn.

The Inamgaon find continues to be a talking point in history circles and iterates just how much we still need to learn, about India’s prehistoric past.

https://www.peepultree.world/livehistoryindia/story/eras/inamgaons-mysterious-burial?srsltid=AfmBOorz7fMYa0a3VTlpzXigJqVeBF6FZCGFQ2c44l9ZXLjsJ2nGV_Tk


prepp-in.translate.goog
Inamgaon, an important Archaeological site is situated on ______ river.
3–4 minutes
इनामगाव पुरातत्व स्थळ समजून घेणे
इनामगाव हे महाराष्ट्र राज्यातील एक अतिशय महत्त्वाचे पुरातत्वीय स्थळ आहे. दख्खन प्रदेशातील सुरुवातीच्या शेती समुदायांबद्दल महत्त्वपूर्ण पुरावे देण्यासाठी हे विशेषतः ओळखले जाते. हे स्थळ आपल्याला हजारो वर्षांपूर्वी जगलेल्या लोकांच्या जीवनाबद्दल, संस्कृतीबद्दल आणि पद्धतींबद्दल मौल्यवान अंतर्दृष्टी देते.

इनामगावचे स्थान
इनामगाव पुरातत्व स्थळ विशेषतः घोड नदीच्या काठावर वसलेले आहे. घोड नदी ही भीमा नदीची उपनदी आहे, जी मोठ्या कृष्णा नदीच्या खोऱ्याचा भाग आहे. नदीजवळील स्थान सुरुवातीच्या वसाहतींसाठी महत्त्वाचे होते, ज्यामुळे शेती, पिण्यासाठी आणि इतर दैनंदिन गरजांसाठी पाणी उपलब्ध होते.

इनामगावचे महत्त्व
इनामगाव हे जोर्वे संस्कृतीशी संबंधित एक प्रमुख स्थळ आहे, जे महाराष्ट्रातील तांबेयुगातील संस्कृती आहे, जी अंदाजे १४०० ते ७०० ईसापूर्व आहे. इनामगाव येथील उत्खननातून असे दिसून आले आहे:

मातीच्या भिंती आणि गवताच्या छतांनी बनवलेल्या घरांसह नियोजित वसाहतींचे पुरावे.
गुंतागुंतीची सामाजिक संघटना, कदाचित दफन पद्धती आणि घराच्या आकारांवर आधारित स्थितीतील फरक समाविष्ट करणे.
शेतीचा सराव, प्रामुख्याने बार्ली, गहू, मसूर आणि विविध बाजरी पिकवणे.
जनावरांचे पालन, ज्यामध्ये गायी, मेंढ्या, शेळ्या आणि डुकरांचा समावेश आहे.
मातीकाम (वेगळी जोर्वे भांडी), मणी बनवणे आणि तांब्याचे काम यासारख्या हस्तकला उपक्रम.
इनामगाव येथील निष्कर्ष पुरातत्वशास्त्रज्ञांना या प्राचीन समुदायांच्या जीवनशैली आणि उपजीविकेच्या पद्धतींची पुनर्बांधणी करण्यास मदत करतात.

पर्यायांचे विश्लेषण करणे
इनामगाव जागेच्या संदर्भात दिलेल्या पर्यायांचा विचार करूया:

इंद्रायणी नदी: महाराष्ट्रातील (पुण्याजवळ) एक महत्त्वाची नदी असली तरी, इनामगाव तिच्या काठावर वसलेले नाही.
उल्हास नदी: ही नदी महाराष्ट्राच्या कोकण प्रदेशातून वाहते, इनामगाव जिथे आहे तिथे नाही.
घोड नदी: इनामगाव हे घोड नदीच्या काठावर वसलेले असल्याचे ऐतिहासिक आणि पुरातत्वीयदृष्ट्या दस्तऐवजीकरण केलेले आहे.
कुकडी नदी: ही महाराष्ट्रातील दुसरी नदी आहे, परंतु इनामगाव तिच्या काठावर वसलेले नाही.
पुरातत्वीय शोध आणि भौगोलिक नोंदींनुसार, घोड नदी हीच खरी नदी आहे.

पुरातत्व स्थळ संबंधित नदी सांस्कृतिक काळ
इनामगाव घोड नदी चॅल्कोलिथिक (जोर्वे संस्कृती)
दैमाबाद प्रवरा नदी हडप्पा, चाल्कोलिथिक (मालवा, जोर्वे)
नेवासा प्रवरा नदी निम्न पुरापाषाणयुग ते मध्ययुगीन
पुनरावृत्ती सारणी: महत्त्वाची पुरातत्व स्थळे आणि नद्या
साइटचे नाव नदी स्थान (राज्य) महत्त्व
इनामगाव घोड महाराष्ट्र प्रमुख जोर्वे संस्कृती स्थळ, सुरुवातीच्या शेतीचे पुरावे
हडप्पा रवी पंजाब, पाकिस्तान सिंधू संस्कृती शहर
मोहेंजोदारो सिंधू सिंध, पाकिस्तान सिंधू संस्कृती शहर
लोथल भोगावो (साबरमतीची उपनदी) गुजरात, भारत सिंधू संस्कृतीचे बंदर शहर
कालिबंगन घग्गर-हकरा (सरस्वती) राजस्थान, भारत सिंधू संस्कृतीचे स्थळ, नांगरलेल्या शेताचा पुरावा
इनामगाव बद्दल अतिरिक्त माहिती
इनामगावमध्ये अनेक टप्प्यांत वस्ती होती, ज्यामध्ये वसाहतीच्या पद्धती आणि दफन पद्धतींमध्ये उत्क्रांती दिसून येते. सर्वात जुना टप्पा माळवा संस्कृतीच्या प्रभावाशी संबंधित आहे, त्यानंतर मुख्य जोर्वे संस्कृतीचा काळ येतो. ७०० ईसापूर्व या जागेचा नाश झाला, कदाचित हवामान बदलांमुळे किंवा शेतीवर परिणाम करणाऱ्या इतर पर्यावरणीय घटकांमुळे.

पाच खोल्या असलेले घर आणि घरातच दफनभूमी सापडणे, कदाचित एखाद्या प्रमुखाचे, हे सामाजिक पदानुक्रम सूचित करते. मुलांसाठी कलश दफन आणि प्रौढांसाठी विस्तारित किंवा पिथोस दफन यासारखे विविध प्रकारचे दफनविधी देखील त्यांच्या रीतिरिवाजांबद्दल संकेत देतात.

discovermh.com
खानदेशातील अश्मयुगीन स्थळे | Discover Maharashtra
Discover Maharashtra
11–14 minutes
खानदेशातील अश्मयुगीन स्थळे –
पुरातत्त्वशास्त्र म्हणजे प्राचीन मानवी समाजाचे अध्ययन आहे. ते करण्यासाठी प्राचीन लोकांनी मागे सोडलेल्या अवशेषांचा शोध घेऊन व त्यांचे सखोल निरीक्षण करावे लागते. निरीक्षणातून मिळालेल्या माहितीचे विश्लेषण करतात. त्यासाठी त्या जुन्या कालखंडातील हवामान, भौगोलिक परिस्थिती, ज्ञात इतिहास आणि एकूणच तत्कालीन पर्यावरण विचारात घेतात. यांत अनेक गोष्टींचा अंतर्भाव असल्यामुळे, हे शास्त्र विज्ञान व मानवशास्त्र अशा दोन्ही विभागांत समजले जाऊ शकते. प्राचीन भारतीय इतिहासाची पुरावे हे पुरातत्त्व अभ्यासाच्या आधारे मिळालेले आहेत ज्या प्रमाणे सिंधू संस्कृती हडप्पाकालीन स्थळे या सर्व घटकांचा अभ्यास पुरातत्त्व शास्त्राच्या माध्यमातून केला गेलेला आहे.लाखो वर्षांपूर्वीचे मानवी जीवन समजून घेण्यासाठी पुरातत्व हे एकमेव शास्र आहे. पुरातत्त्वशास्त्र हे मानव जातीचा इतिहास शोधते. सुमारे २.५ लाख वर्षांपूर्वी आफ्रिकेत मानवाने प्रथमतः तयार केलेल्या दगडी हत्यारापासून ते नजीकच्या काही दशकांपर्यंतच्या काळाचा अभ्यास या विषयात येतो..त्याकाळचा अभास करण्यास इतिहासकारांना काहीच साधन लिखित स्वरूपात उपलब्ध नसते. हा काळ म्हणजे मानवी इतिहासाच्या एकूण काळापैकी सुमारे ९९ % काळ आहे. म्हणज्र प्रागैतिहासिक ते साक्षरतेचा प्रसार होईपर्यंतचा काळ.(खानदेशातील अश्मयुगीन स्थळे)

पुरातत्त्वशास्त्राचा उद्देश मानवी उत्क्रांतीपासून ते सांस्कृतिक उत्क्रांतीपर्यंतचा सांस्कृतिक इतिहास जाणून घेणे हा आहे. पुरातत्त्वशास्त्रात खालील गोष्टींचा अंतर्भाव होतो. निरीक्षण व सर्वेक्षण, उत्खनन आणि मिळालेल्या माहितीच्या आधारे उत्खननानंतरचे विश्लेषण. यानंतर पुरातन काळाची अधिक माहिती मिळू शकते. व्यापक अर्थाने, पुरातत्त्वशास्त्र हे परस्परावलंबी शाखांतील शोधांवर अवलंबून आहे. त्या शाखा म्हणजे इतिहास, कलेचा इतिहास, वैज्ञानिकशास्त्रे, भूगर्भशास्त्र, तसेच भाषाशास्त्र, भौतिकशास्त्र, माहितीविज्ञान, रसायनशास्त्र, संख्याशास्त्र, जीवशास्त्राच्या इतरशाखा पुरापर्यावरणशास्त्र(paleoecology), पुराप्राणिशास्त्र (paleozoology), paleoethnobotany,व पुराजीवशास्त्र (paleobotany) प्रागैतिहासिक काळापासून मानवी इतिहास उभा करण्यासाठी विसाव्या शतकात पुरात्विय संशोधनात तंत्र आणि व्याप्ती यात बरेच बदल झाले.

उत्खननाची शास्त्रशुध्द  पध्दत विकसित होत गेली. इतिहास म्हणजे केवळ कलात्मक वस्तू आणि वास्तू किंवा विशिष्ट मानवी वंशाचा, वर्गाचा अथवा प्रदेशाचा अभ्यास करण्याचे ध्येय न रहाता विशाल मानवी समाजाच्या संपूर्ण अस्तित्व, विकास आणि विकासाला, अधोगतीला कारणीभूत ठरलेल्या सर्व पुराव्यांचा अभ्यास करणे हे ध्येय पुरातत्व शास्राने पुढे नेल्याने या शास्त्राच्या कक्षा  संबंध मानवी समाजाच्या इतिहासाशी एकरूप झाल्या आहेत असे प्रतिपादन पुरातत्व विद्या या पुस्तकात शां.बा.देव यांनी केले आहे. प्राचीन मानवी जीवन कसे होते?  इतिहास प्रामुख्याने राजकीय घटना आणि घडामोडी यांवर जोर देतो पण सर्वसामान्य माणसाचे जीवन कसे होते? याचा आढावा लिखीत इतिहास घेत नाही तशी साधने उपलब्ध नाहीत म्हणून पुरातत्व शास्त्रांच्या आधारे त्याने मागे ठेवलेल्या वस्तूंच्या आधारे समजून घेण्यासाठी मार्ग म्हणजे पुरातत्व होय.सर मॉर्टीमर व्हिलरच्या मते तर पुरातत्त्वीय पुराव्यांवरून मानवी मनाचा वेध घेता येतो. आणि तो कसा घ्यायचा हे पुरात्वज्ञांचे काम आहे. म्हणून पुरातत्वज्ञ केवळ वस्तूरूप पुरावा खणून काढतो असे नाही तर मानवी समाजाचे व्यक्तिमत्त्व खणून काढतो.

मानवी इतिहासाचे अभ्यासकांनी सोयीसाठी तीन कालखंड कल्पिलेले आहे. १.प्रागइतिहास, २. इतिहासपुर्व काळ, ३.इतिहासकाळ होय. एवढ्या मोठ्या कालखंड उभा करणे हे एक आव्हान आहे. त्यामुळे नवनवीन गोष्टी समोर येत जातात तशतशी आधीचे सिध्दांत आणि गृहितके बदलावी लागतात. यात अजून एक महत्वाचे ठरते ते म्हणजे भौगोलिक घटना आणि त्यांचे परिणाम याचाही अभ्यास केला जातो कारण मानवी जीवन हे पर्यावरणाचे अभिन्न अंग आहे. नविन येणारे तंत्र आणि तंत्रज्ञान हे सुद्धा मानवी जिवनात अमुलाग्र बदल घडवत असतात. जसे की पाषाणयुगात दगडी शस्रे वापरून शिकार करणारा माणूस शेती करायला लागल्यापासून स्थिरावला भटके आयुष्य संपले. पशुपालक झाल्यावर अन्नाची चणचण संपली आणि इतर बाबतीत विचार करू लागला. संस्कृती म्हणजे जगण्याची रीत आणि ही रीत सतत बदलती असते कारण मानवी विकास हा सुद्धा वाहता ओघ असतो.चाकाचा शोध,धातूचा शोध अशी हजारो उदाहरणे देता येतील.

मानवी संस्कृतीच्या वेध घ्यायला पुरातत्त्वीय अवशेष व्यतिरिक्त इतर शाखांची मदत घ्यावी लागते. मानववंशशास्त्र, भाषाशास्र होय. साहित्य, परंपरा हळूहळू इतर शास्त्र जोडली गेली कारण प्रत्येक शास्त्र मानवी जीवनाचा अभिन्न अंग आहे.जगभरात असे संशोधन होते आहे आणि विविध संस्कृती त्यांच्या विशेष स्वरूपात समोर येत आहे. त्यांचा तुलनात्मक अभ्यास होतो आहे आणि मानवी विकासाचे टप्पे वेगवेगळ्या भौगोलिक परिस्थिती आणि इतर घटकांवरून समोर येत आहे. चीन, इजिप्त जपान,इराण इराक पाकिस्तान आणि अफगाणिस्तान ही यादी बरीच लांबलचक आहे कारण मानवी उत्क्रांतीच्या प्रक्रिया जाणून घ्यायची उत्सुकता आहे. भारतात अशी उत्खनने आणि अभ्यास होत आहे. मोहेंजोदडो हडप्पा व्यतिरिक्त अनेक स्थळे सापडली त्यावरून पहिला नागरीकरण, त्याचा ऱ्हास, दुसरे नागरीकीकरण आणि त्याचा  ऱ्हासाची कारणे यांची मिमांसा तुलना होते आहे. या पुरातत्विय स्थळांची तुलना आंतरभारतीय तसेच जगातील इतर संस्कृतीशी होत आहे. या पार्श्वभूमीवर खानदेशातील पुरातत्त्वीय स्थळे काय सा़ंगतात त्याचा आढावा घेण्याचा प्रयत्न आहे.

खानदेशातील हवामान भौगोलिक परिस्थिती यांचा विचार केला तर पर्वतीय रांगा, तापीपुर्णा पांझरा, गिरणा इत्यादी नद्या आणि त्यांच्या उपनद्या यामुळे हा भुभाग समृध्द होता. नदीकाठच्या बाजूला मानवी वसाहती आणि संस्कृती बहरते. महाराष्ट्रातील इतर पुरातत्त्वीय स्थळांशी  तुलना केली तर गोदावरी, कृष्णा नदीच्या खोऱ्यात असलेल्या लोकवस्तीच्या तुलनेत तापी नदीच्या खोऱ्यात असलेल्या लोकवस्तीच्या संख्या तसेच लोकसंख्या जास्त असल्याचे ढवळीकर आणि वसंत शिंदे यांच्या अभ्यासातून निष्पन्न झाले आहे. खानदेशात सापडलेल्या स्थळांपैकी काही अश्मयुगीत बऱ्यापैकी ताम्रपाषाणयुगीन स्थळे आहेत. संस्कृतंचा सविस्तर चर्चा केली तर पहिली संस्कृती सावळदा जे प्रकाशेच्या विरूध्द किनाऱ्यावर आहे. प्रकाशेला जेव्हा उत्खनन झाले त्याच काळात येथे एम.ए. साळी यांनी उत्खनन केले. ताम्रपाषाणयुगीन दक्षिण भारतात प्रातिनिधिक असे हे स्थळ आहे म्हणून सावळदा संस्कृती असे नाव दिले. गुजरात मधील संबंध अधोरेखित करणारी रंगपूर या पुर्वहडप्पन स्थळाशी संबंध खापरे आणि मातीच्या भांड्यावरून समजतो. पशुपालक तसेच शेती अशी ही संस्कृती आहे.

दुसरी उत्तर हडप्पा संस्कृती महाराष्ट्रातील दायमाबाद हे उत्तम उदाहरण आहे. मातीचे शिक्के, हडप्पा लिपी असलेले शिक्के, ब्रांझचे साठे इत्यादि गोष्टी लक्षात येतात यावरून उत्तरेकडील संस्कृती शी देवाणघेवाण होती हे लक्षात येते. तापीच्या खोऱ्यात गुजरात, मध्यप्रदेशातील स्थळे ही या संस्कृतीची उदाहरणे आहेत. माळवा संस्कृती महाराष्ट्रातील स्थिरावलेले शेतकरी दिसतात. यांत दायमाबाद, इनामगाव, कायथा, नागद, विदिशा, ऐरण, नावडाटोली ही उदाहरणे आहेत. या संस्कृतीची विशेषतः आहे ती म्हणजे चुली, तंदुर, धान्य साठविण्यासाठी कोठारे सुबकपातळ भांडी लालकाळी वर काळ्या रंगाच्या चित्र काढलेली धान्ये गहू, हरभरा, बार्ली तर प्राण्यांच्या अवशेषात गाईगुरे, शेळ्यामेंढ्या तसेच दागदागिने, मणी, शंखशिंपले आणि त्यांच्या बांगड्या गुजरात किनाऱ्याशी संबंध दिसतो. धार्मिक जीवन दिसते मातीचे बैल, वृक्षपुजा,आहुतीच्या जागा मातृकांच्या मृणमुर्ती इत्यादि  खूप सखोल अभ्यास केला गेल्यामुळे विशेषतः दायमाबाद आणि इनामगाव या स्थळांचा त्यामुळे संपूर्ण मानवी जिवनाचा पट मांडता आला. जोर्वे संस्कृती मोठी खेडी ही संकल्पना विकसित झालेली दिसते ‌ तांत्रिक प्रगती झालेली दिसते. या संस्कृतीची ओळख करून घेतली कारण खानदेशातील उत्खनन स्थळांवर या तिन्ही संस्कृतीचे थर दिसतात.(खानदेशातील अश्मयुगीन स्थळे)

महाराष्ट्रातील दोनशे पुरातत्त्वीय स्थळांपैकी शंभर स्थळे तापीच्या खोऱ्यातील आहे. या खोऱ्याची वैशिष्ट्यपूर्ण रचना दक्षिण आणि उत्तर भारत यांच्यामधील स्थान तसेच शेतीसाठी उपयुक्त व योग्य हवामान यामुळे महाराष्ट्रातील आद्य शेतकरी तापी खोऱ्यात उदयास आला. ताम्रपाषाणयुगीन समाज रचनेची आणि संस्कृती यांची माहिती कावठे गावी झालेल्या उत्खननातून सन १९८४ मधील आद्य शेतकऱ्यांच्या जीवनावर प्रकाश पडतो. सुमारे एक लाख वर्षांपूर्वी अश्मयुगीन काळात खानदेशात मानवी वस्तीचे पुरावे साळी यांनी केलेल्या धुळे जिल्ह्यातील साक्री येथील भाडणे गावात केलेल्या उत्खननात दिसून आले आहेत. भाडणे येथील उत्खननात अश्मयुगीन हत्यारे  सापडलेली आहेत. अशीच उत्खनने किरवाडे, भोनगाव, भाडणे, भामेर, साक्री, दातरती, ढवळी विहिरपाडा इत्यादि ठिकाणी झाली आहेत. यांचा काळ सुमारे इ.स.पुर्व एक लाख ते तीस हजार वर्ष एवढा आहे.

उत्तर अश्मयुगीन स्थळे –
कासारे, गणेशपूर, खोरी, घोडदे, छडवेल,  टिटाणे, नवडणे, मालपूर, म्हसदी, वसमार, शेणपूर, शेवगे ही आहेत. उत्तर पुराश्मयुगीन स्थळे इ.स.पूर्व तीस हजार ते दहा हजार वर्ष एवढा मोठा आहे. आष्ठाणे, आमखेल, इंदवे, धनेर, नवडणे, ब्राम्हणवेल, वासखेडी इत्यादि होय.

ताम्रपाषाणयुगीन स्थळे –
इ. स. पुर्व २५०० ते एक हजार वर्षे चि़ंचखेडे, चिकसे, छडवेल, जैताणे, दुसाणे, भाडणे, नाडसे, रूणबली, साक्री इत्यादि होय. नामशेष झालेल्या प्राण्यांच्या अश्मीभूत अस्थी दहिवेल आणि दाभलपाडा येथे मिळाल्या आहेत. साक्रीपासून चार किलोमीटर अंतरावर पश्र्चिमेला कवठे हे गाव आहे. १९५८ मध्ये डॉ वसंत शिंदे यांनी उत्खनन करून महाराष्ट्रातील शेतकरी साडेचार हजार वर्षांपूर्वी येथे रहात होते हे सिद्ध केले.येथील उत्खननात ताम्रपाषाणयुगीन संस्कृतीची वसाहत सापडली आहे आणि त्यावरून खानदेश तसेच परत एकदा १८८४ मधील उत्खननातून प्रकाश पडला. येथली मृद्भभांडी ही इसवीसन पूर्व पाचशे ते पहिल्या शतकातील आहे. लाल दणकट भांडी, सावळदा संस्कृतीची भांडी, तपकिरी रंगाची गुळगुळीत भांडी, लाल राखी रंगाची भांडीजाड, तांबडी रंगाची भांडी या सर्व भांड्यावरून मानव पशुपालन करत होता हे समजते. उत्खननात विविध हत्यारे, शंखशिंपले, मणी मिळाले आहेत. हरप्पन संस्कृतीशी संबंध होता हे मण्यावरून कळते. दफन पध्दतीत शरीर उणाणे तर लहान मुलांना लांब आकाराच्या खड्ड्यात वाकलेल्या स्थितीत पुरत अनेक प्राण्यांच्या हाडांवरून उदरनिर्वाह करण्यासाठी विविध प्राण्यांवर अवलंबून होते हे दिसते.

प्रकाशे येथील उत्खननात  ताम्रपाषाणयुगापासून तर मध्ययुगीन पुरावे सापडले आहेत. यांत उत्तर सिंधु, माळवा, जोरवे संस्कृतींचे अवशेष दिसतात. हत्यारे, पाती, चाकु, शिंपले, मातीच्या असंख्य वस्तू दिसतात. सातवाहन काळातील जीवन समजून घेण्यासाठी प्रकाशे येथील उत्खननात सापडलेल्या वस्तू उपयोगी आहे. इथल्या लोकवस्तीचा कालखंड इ. सन पूर्व १७०० ते इसवीसनाच्या तेराशे पर्यत आहे नंतर ते एक तिर्थक्षेत्र उदयास आलेले दिसते.

महाराष्ट्र-एक पुरातत्त्वीय समालोचन या पुस्तकातील यादीच्या आधारे खानदेशात (धुळे, नंदुरबार) जिल्ह्यातील ३०-४० हजार वर्षांपासून गावांनी अतिप्राचीन वैभवशाली इतिहास आपल्या उदरात साठवून ठेवला आहे. (इंडियन अर्किऑलॉजी-ए-रिव्हियू 1953 ते 54)  तापी खोऱ्यात महाराष्ट्रातील पहिल्या शेतकरी वसाहतीचा उत्खननीय पुराव्यावरून शोध लागला. खानदेशवासीयांच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण गोष्ट म्हणजे सावळदा (शिरपुरा-धुळे मार्गावर) येथे उत्तर हरप्पन काळात संस्कृती विकसित झाली ती सावळदा संस्कृती म्हणूनच (इ. स. पूर्व २२००-१८०० ते ) उदयास आली. खानदेशात एका स्वतंत्र संस्कृतीचा त्याकाळात उदय झाला. असा ऐतिहासिक वारसा अतिप्राचीन काळापासून धुळे व नंदुरबार भागास लाभला आहे. उत्तर हरप्पन संस्कृती  ५ ते ४ हजार वर्षांपूर्वी येथेच विकसित झाली. त्या पुरातत्त्वीय संस्कृतीचे अवशेष कावठे (साक्री) येथील उत्खननात मिळाले.

खानदेशात २०० च्या वर प्राचीन संस्कृतीची स्थाने पुरातत्त्वीय संशोधकांना मिळाल्यास  १०० च्या वर स्थाने धुळे जिल्ह्यात मिळाल्या. इ. स. पूर्व १४०० ते १००० जार्वे संस्कृतीकालीन अवशेष (अक्कलपाडा) चिंचखेडा येथे मातीची भांडी, खापरे व तांब्याचा भाला सापडला. यावरून येथे समृद्ध संस्कृती नांदत होती. नासा येथील अभ्यासक डॉ. पियानो यांच्या अभ्यासावरून खान्देशचा (धुळे जिल्ह्याचा) भूभाग भौगोलिक स्थित्यंतरानुसार ६६ लाख वर्षांपूर्वी तयार झाला. पांझरा नदी ही १० लाख वर्षांपूर्वी शेंदवडच्या डोंगरातून उगम पावली. धुळे जिल्ह्यास पांझरा, कान या नद्यांवर बंधारे बांधून त्या पाण्यावर अभिनव जलसिंचन व्यवस्था प्राचीन काळापासून आजतागायत सुरू आहे. प्रकाशा, कावठे येथील उत्खननात सापडलेल्या वस्तू, अलंकार, मणी, भांडी वैभवाची साक्ष देतात. लोकसंस्कृतीची, गणराज्याची समृद्ध संपभूमी होती. इ. स. पूर्व काळात मौर्यांनी येथे सत्ता स्थापली. इ. स. पूर्व २३० च्या सुमारास सातवाहनांचे वर्चस्व निर्माण झाले. महत्त्वाचे व्यापारी मार्ग (सार्थवाहपथ) याच जिल्ह्यातून गेल्याने व्यापारी महत्त्व वाढले. सुरत-बऱ्हाणपूर सुरत-नागपूर, नागपूर-आगा इत्यादी मार्ग. इ.स. २४० ते ४१९  पर्यंत अभिरांनी या प्रदेशावर राज्य केले. खान्देश प्राचीन काळापासून अभिरांची म्हणजे अहिरांची भूमी म्हणून ओळखली जाते. पुढच्या काळाचा आढावा घेण्यासाठी खानदेशात आणि त्यांच्या परिसरात, सीमांवर असलेल्या बौध्द लेणींचा आढावा घेऊ या.खानदेशातील अश्मयुगीन स्थळे.

 पुरातत्त्वीय उत्खनने : पुरातत्त्वीय अवशेषांच्या शोधार्थ केलेली शास्त्रशुद्ध पद्धतीची उत्खनने. पुरातत्त्वविद्या या शास्त्राबाबत व पुरातत्त्वीय उत्खनने यांबद्दल तज्ञांत अद्यापही गैरसमज आहेत. कसेतरी खणून एखादी कलात्मक वा मूल्यवान वस्तू मिळविणे एवढाच उत्खननाचा उद्देश असतो, असे पूर्वी मानीत. या मतामध्ये उत्खननाच्या हेतूबद्दल जसा गैरसमज दिसून येतो, तद्वतच उत्खननात नशिबाचा भाग बराच आहे, ही कल्पना दृढमूल झाल्याचे आढळून येते. हे गैरसमज दूर होण्यासाठी विसाव्या शतकातील पुरातत्त्वविद्येचे शास्त्रीय स्वरूप यास कारणीभूत झाले परंतु अठराव्या- एकोणिसाव्या शतकांत मध्यपूर्व व इतरत्र केली गेलेली उत्खनने या गैरसमजाला कारणीभूत ठरली. या काळातील उत्खनने अशास्त्रीय होती. विशेषतः मध्यपूर्वेत उत्खनने म्हणजे गडबड, कोलाहल, मारामाऱ्या, बक्षिसांच्या लालसेने उपटून काढले गेलेले अवशेष, राजकीय पार्श्वभूमीशी संबंधित असलेले हेवेदावे व त्यातून झटपट केली गेलेली खुदाई, अवशेषांची पळवापळवी यांचे मूर्तिमंत चित्र होय. सायंकाळी प्रत्येक मजुराला सापडलेले उत्खनित अवशेष मांडून उत्खननाचा निदेशक त्याला पाहिजे तेच अवशेष निवडून घेइ व क्वचित एखाद्या मजुराला वा मुकादमाला खूष होऊन बक्षीसही देई. अशा उत्खननाची पद्धती इतिहासजमा झाली आहे. आता योजनाबद्ध उत्खनन व विविध शास्त्रांची मदत हे नवे स्वरूप उत्खननाला प्राप्त झाले आहे. त्याचप्रमाणे केवळ कलात्मक वस्तू मिळविणे वा फक्त त्यांचीच नोंद घेणे, ही अवस्थाही कालबाह्य झालेली असून  उत्खनन बारीकसारीक व सर्व प्रकारचा पुरावा मिळविण्यासाठी केले जाते. मानवी जीवन व त्या भोवतालची परिस्थिती यांचे आकलन होण्यासाठी सर्वंकष पुरावा मिळविणे, हे उत्खननाचे ध्येय निश्चित झाले असल्याने, विसाव्या शतकातील उत्खनने त्या आधीच्या काळात झालेल्या उत्खननांपेक्षा वेगळ्या स्वरूपाची आणि तंत्राची आढळून येतात.

यूरोपात सतराव्या-अठराव्या शतकांत झालेली उत्खनने प्रामुख्याने कलात्मक वस्तू मिळविण्यासाठी केली गेली. यांत अद्‌भुततेच्या वलयाबरोबर केवळ काही तरी नवा छंद अशीही रिकामपणाची एक झालर या प्रकारच्या संशोधनाला नकळत लागली गेली आहे. हे उत्खननात्मक संशोधनही मानवी इतिहासाच्या दृष्टीने पाहता अत्यंत मर्यादित काळाशी निबद्ध होते. ज्याबद्दल काही माहिती नाही, तो प्रागितिहासाचा काळ अशा तऱ्हेच्या छंदिष्ट उत्खननातून पूर्णपणे वगळला जात होता. त्यामुळे या उत्खननाच्या मर्यादा व त्यांची तांत्रिक कमतरता स्पष्टपणे उघड होते. इतिहास म्हणजे केवळ राजकीय वा कलाविषयक घडामोडी असे समीकरण मांडले गेल्याने पुरातत्त्वीय उत्खननाचे ध्येय मर्यादित राहिले असावे, परंतु राजकीय इतिहासाव्यतिरिक्त एखाद्या मानवी समूहाचा आर्थिक व सांस्कृतिक विकास का व कसा झाला, त्यामागची कारणे दर्शविणारा पुरावा विविध प्रकारच्या बारीकसारीक वस्तूंतूनही दृग्गोचर होऊ शकतो, ही जाणीव नव्हती. मानवी संस्कृती तांत्रिक प्रगती, दळणवळणाची साधने, समजरचना, अन्नोत्पादनाची अवस्था यांसारख्या बाबींवर अवलंबून असल्याने, या बाबींवर प्रकाश टाकणारा पुरावाही उत्खनन करून मिळविता येईल वा येतो ही जाणीवच आधीच्या काळातील उत्खनकांना नव्हती. म्हणूनच मानवी संस्कृतीचा विकास व तो विकास होण्यासाठी साहाय्यभूत ठरलेली परिस्थिती यांचा मागोवा घेणे, हे व्यापक ध्येय पुरातत्त्वीय उत्खननाचे मानले जाते. मानवाने बनविलेली वा वापरलेली प्रत्येक वस्तू त्यांची सांस्कृतिक व तांत्रिक ज्ञानाची अवस्था त्याचप्रमाणे त्यांच्या गरजा दर्शविते. या गरजा परिस्थितीशी निगडित असतात. मानवाने मागे ठेवलेल्या वस्तूरूप पुराव्यांवरून यांचे आकलन करून घेणे व त्यामागची कारणपरंपरा विषद करण्याचा प्रयत्न करणे, हे पुरातत्त्वीय उत्खननाचे ध्येय सर्वमान्य झाले आहे. या सांस्कृतिक इतिहासाच्या जाणकारीत एक गोष्ट लक्षात घेणे आवश्यक आहे. ती ही की इतिहासाला कालमापनाची चौकट अपरीहार्य ठरते. त्याशिवाय उत्खनित पुराव्याचे महत्व शास्त्रीय दृष्ट्या कमी प्रतीचे ठरतेय पुरातत्त्वीय उत्खननात मिळालेला पुरावा तौलनिक दृष्ट्या कालमापित करण्याचा प्रयत्न केला जातो. अशा कालमापनाला सापेक्ष कालमापन म्हणतात. एखादा अवशेष दुसऱ्या अवशेषापेक्षा जास्त प्राचीन वा अर्वाचीन आहे, हे ठरविणे स्तरीय संदर्भाने करता येते. यांव्यतिरिक्त कार्बन–१४ पोटॅशियम, आर‌्गॉन यांसारख्या अनेक शास्त्रीय पद्धतींच्या मदतीने निश्चित कालमापन करणे शक्य झाले आहे.

पुरातत्त्वीय उत्खननात सापेक्ष कालमापन दोन प्रमाणांच्या साहाय्याने करता येते : समस्थलत्व आणि अनु्क्रम.  एकाच थरात सापडलेल्या वस्तू बहुधा समकालीन असतात. अनुक्रमाच्या तत्वानुसार खालचा थर त्यावरील थरापेक्षा कालदृष्ट्या आधीचा. याचाच अर्थ असा, की खालच्या थरात सापडलेली वस्तू वरच्या थरातील वस्तूंपेक्षा कालदृष्ट्या आधीची ठरते. स्तरवार उत्खननात अवशेषांचा काळ वर उल्लेखिलेल्या तत्त्वांनुसार तौलानिक दृष्ट्या ठरविला जातो व उपलब्ध झालेल्या पुराव्यांची मांडणी सापेक्ष कालनिबद्ध केली जाते.

पुराव्याचे योग्य वर्गीकरण करून सापेक्ष कालनिबद्ध चौकट योजली नाही, तर त्या उत्खनित पुराव्याला काही अर्थ राहत नाही. म्हणूनच आधुनिक पुरातत्त्वीय संशोधनात स्तरनिबद्ध उत्खननाचा अवलंब केला जातो. पुराव्याच्या अनुक्रमाची नोंद केल्याशिवाय इतिहास हा खऱ्या अर्थाने इतिहास ठरणार नाही, त्याचप्रमाणे संस्कृतीच्या विकासाची वा अवनतीची मांडणीही करता येणार नाही. एकोणिसाव्या शतकातील उत्खननात सांस्कृतिक अनुक्रम योजण्याची दृष्टीच नसल्याने व उत्खननात केवळ चांगले व अखंड कलात्मक अवशेषच मिळविण्याचा प्रयत्न असल्याने, ही उत्खनने बरीचशी तोकडी व काहीशी विध्वंसक स्वरूपाची ठरली. संकुचित ध्येय विध्वंसक तंत्र आणि सर्वंकष पुरावा मिळाविण्याची उदासिनता यांमुळे या उत्खननांत प्राचीन संस्कृतींच्या फक्त काही अंगांचे दर्शन झाले परंतु त्या संस्कृतीचे सर्वांगीण दर्शन आणि तिच्या विकासाचा इतिहास उलगडण्यास मदत झाली नाही.

सांस्कृतिक जीवनाचे यथार्थ दर्शन मानवाने मागे ठेवलेला विविध स्वरूपाचा पुरावा करू शकतो. मात्र यासाठी उत्खनक अत्यंत जागरूक असावा लागतो, त्याचप्रमाणे त्याला विविध शास्त्रशाखांतील तज्ञांची मदत घ्यावी लागते. अशा तऱ्हेने अगदी काळजीपूर्वक जमा केलेला पुरावा मानवी जीवनाच्या विविध अंगांची त्याचप्रमाणे तत्कालीन नैसर्गिक परिस्थितीची माहिती करून देऊ शकतो. उदा., उत्खननात सापडलेली मृत्पात्रे–तत्कालीन गरजा, मृत्पात्रांच्या बनावटीचे तंत्र त्यांच्या भाजणीस वापरलेली पद्धती, आकारानुसार सांस्कृतिक संपर्क, रंगविलेल्या चित्रानुसार कलात्मकता, प्राणी, धार्मिक चिन्हे इत्यादींची माहिती, देशी व परदेशी बनावटीची मृत्पात्रे, विशिष्ट कामाकरिता वापरलेली मडकी आणि मृत्पात्रांवर उमटलेल्या प्रतिकृतीनुसार धान्याचे प्रकार वा कापडाचे प्रकार वा चटईचे प्रकार इत्यादी. मानवी दफनाचा पुरावा मिळाल्यास त्यातून दफनपद्धतीबद्दलचे संकेत, मृत्यूनंतरच्या जीवनाबद्दलच्या समजुती, दफनात ठवलेल्या इतर वस्तूंनुसार मृताची सामाजिक आणि आर्थिक परिस्थिती, मृत व्यक्तीचे वय, लिंग व संभाव्य वंश आणि मृत्यूचे संभाव्य कारण यात बाबी जाणून घेता येतात. अलीकडे विविध शास्त्रांची मदत उत्खनित पुराव्याच्या अर्थबोधनाच्या कामी घेता येऊ लागली आहे. धातूच्या वस्तूंचे पृथक्करण करून त्या वस्तूच्या बनावटीचे तंत्र, तिची शुद्धता वा मिश्रण व तो धातू मिळविण्याचे संभाव्य स्थळ इत्यादींचे ज्ञान होऊ शकते. जनावरांची हाडे सापडल्यास त्यावरून माणसाळविलेल्या प्राण्यांचे प्रकार, त्यांचा मांसाकरिता उपयोग केला गेला असल्यास सापडलेल्या हाडांच्या कापणीनुरूप वापलेली हत्यारे, जनावरांचे कोणते भाग कोणत्या घरात सापडले त्यानुसार अन्नपद्धती व समाजाची आर्थिक रचना, हाडांच्या वा खुरांच्या वैशिष्ट्यांनुसार त्या प्राण्यांचा संभाव्य उपयोग इ. अनेक गोष्टींवर प्रकाश टाकता येऊ शकतो. धान्यावरून, अन्नपद्धती, धान्याची जात, हवामान इ. जाणून घेता येतात. मात्र याकरिता पुरावनस्पतिशास्त्रज्ञ, धातुशास्त्रज्ञ भूशास्त्रज्ञ, मानवशास्त्रज्ञ इ. अनेकांची मदत लागते. कार्बन –१४ व इतर पद्धतींनी कालमापन निश्चित केले असल्याने सांस्कृतिक अनुक्रमालाही जास्त निश्चिती देता येऊ लागली आहे.

आधुनिक उत्खनन-तंत्र स्तरनिबद्ध व क्रमनिबद्ध असते. स्तरवार उत्खननात एकाद्या स्थळी निरनिराळ्या काळांत वस्त्या झाल्याने प्रत्येक वस्तीच्या अवशेषांचे थर एकावर एक साठत जाऊन कालांतराने त्याचे पांढरीचे टेकाड निर्माण होते. एखाद्या वस्तीला आग लागली वा ती पुरामुळे नष्ट झाली, तर त्यातील घरे-दारे पडतात आणि या पडलेल्या घरांत अनेक वस्तू गाडल्या जातात. तिथे पुन्हा वस्ती होते तिचाही नाश झाल्यावर तिचे  अवशेष पहिल्या वस्तींच्या अवशेषांवर पडतात. अशा तऱ्हेने प्रत्येक वस्तीच्या अवशेषांचा थर निर्माण होतो. एकाच थरात सापडलेले अवशेष समकालीन ठरतात, तर खालच्या थरातील अवशेष वरच्या थरातील अवशेषांपेक्षा कालदृष्ट्या आधीच्या काळातले ठरतात. म्हणूनच स्तरवार उत्खननात सर्वांत खालच्या थरातले म्हणजे पहिल्या वस्तीचे अवशेष असतात व सर्वांत वरच्या थरातले अवशेष कालदृष्ट्या शेवटच्या वस्तीचे ठरतात.

स्तरनिबद्ध उत्खनन म्हणूनच अत्यंत काळजीपूर्वक करावे लागते. प्रत्येक थराचे स्वरूप त्याची घडन व त्या थराची व्याप्ती नीट समजून घेणे आवश्यक असते, त्या थराचा उत्खनित वास्तूशी असलेला संबंध अचूकपणे नोंदणे आवश्यक असते. उदा., घराचे अवशेष सापडल्यास, त्या घराच्या आधीचे थर, घराचे समकालीन थर व घरावरचे थर नीट बघून त्यांत सापडलेल्या वस्तूंचे स्वरूप व त्यांचा काळ ठरविता आल्यास, त्या घराचा काळही ठरविता येतो. साहचर्यानुरूप कालमापन हे तत्त्व उत्खननात महत्त्वाचे ठरते. थराच्या जाडीवरून वा केवळ खोलीवरून त्याचा काळ ठरविता येत नाही. काळ केवळ त्या थरात सापडलेल्या पुराव्यावरून व त्या थराच्या स्थानावरूनच ठरविता येऊ शकतो. थरांच्या स्वरूपावरून काही निष्कर्ष काढता येतात. उदा., मळईंच्या वा गाळवट मातीच्या पुराचा अंदाज बांधत येतो. जळलेल्या लाकडांच्या वा इतर अवशेषांवरून आगीची साक्ष पटते. विटांच्या बांधकामामुळे थरांना लालसर रंग येतो. किंबहुना अशा काळजीपूर्वक केलेल्या निरीक्षणानुसार विविध थरांतील विविध घडामोडींचा अंदाज घेता येऊन त्या घडामोडींचा अनुक्रमही लावता येतो. त्या त्या काळातील जीवनाचा जास्तीत जास्त मागोवा घेण्यासाठी प्रत्येक थरातील सर्व प्रकारचा, लहानसहान, छोटा मोठा पुरावा मिळविणे हाच स्तरीय उत्खननाचा मुख्य उद्देश आहे.

स्तरवार उत्खननाच्या विविध पद्धती प्रचलित आहेत. त्याचप्रमाणे उत्खननासाठी उपलब्ध असलेला पैसा व काळ आणि उत्खननासाठी लागणारा संपूर्ण संघ यांचाही उत्खननाच्या स्वरूपाशी संबंध लागतो.

उत्खनन एक प्रकारे शास्त्रीय विध्वंसच होय. कारण प्रत्येक थर व त्यातील पुरावा खणून काढणे याचाच अर्थ तो मूळ संदर्भातून अलग करणे हा होय. म्हणूनच प्रत्येक प्रकारच्या अवशेषांची अचूक नोंद करणे अत्यंत आवश्यक असते आणि ही नोंद त्रिमितीमापन पद्धतीने करावी लागते.

उत्खननाचे मुख्य प्रकार : त्रिमितीमापन करण्यासाठी निरनिराळ्या प्रकारे उत्खननाचे आयोजन करणे आवश्यक ठरते. उत्खनन प्रामुख्याने दोन प्रकारचे असते. एक, उदग्र उत्खनन व दोन, आयत उत्खनन. एखाद्या स्थळाचा सांस्कृतिक उत्क्रम जाणून घ्यावयाचा असल्यास उदग्र उत्खनन करण्यात येते. यात पांढरीच्या टेकाडाच्या सर्वांत उंच भागावर एक खड्डा आखून तो अगदी तळाच्या म्हणजे सर्वांत प्रथम वस्तीच्या थरापर्यंत खणण्यात येतो. अथवा एकच खड्डा न घेता टेकडाच्या माथ्यावर एक, उतारावर एक व पायथ्याजवळ एक असे तीन खड्डे योजून ते खणले जातात. यांना पायरी खड्डे असे संबोधिले जाते. यांत सर्वांत वरचा खड्डा उतारावरील खड्ड्यांच्या माथ्याच्या पातळीपर्यंत खणला जातो आणि उतारावरील  खड्डा पायथ्याच्या खड्ड्याच्या माथ्याच्या पातळीपर्यंत खणला जातो. पायथ्याचा खड्डा नैसर्गिक थरापर्यंत खणतात. यामुळे वेळ कमी लागतो आणि पहिल्या वस्तीपासून ते सर्वांत वरच्या म्हणजे शेवटच्या वस्तीपर्यंतचा अनुक्रम मिळतो. यामुळे त्या स्थळांच्या वस्त्यांचे स्वरूप व कालमर्यादा कळून येते, पण प्रत्येक वस्तीची व्याप्ती व संपूर्ण स्वरूप कळून येत नाही. यासाठी आयत उत्खननाची योजना आखणे श्रेयस्कर ठरते. प्रथम उदग्र उत्खनन व नंतर आयत उत्खनन करणे श्रेयस्कर ठरते. कारण उदग्र उत्खननातून सांस्कृतिक अनुक्रम जाणून घेतल्याशिवाय, आयत, उत्खनन करणे हानिकारक ठरते. आयत उत्खननात प्रत्येक वस्तीचे संपूर्ण स्वरूप कळण्यास मदत होते हे खरे असले, तरी त्याकरिता मोठा संघ, बराच पैसा व जास्त कालावधी लागतो. हे ध्यानात घेऊनच त्याची योजना करावी लागते.

उत्खननाची आखणी : प्रत्येक स्थळाच्या स्वरूपासुसार उत्खननाची आखणी करावी लागेते. उदा., स्तूपाच्या टेकाडाच्या उत्खननाची योजना, टेकडाच्या माथ्यावर एक व पायथ्याशी प्रत्येक दिशेला एक असे चार खड्डे योजून करणे फलदायी ठरते. यामुळे स्तूपाच्या माथ्यावर वास्तू–अवशेष व प्रदक्षिणापथाचे अवशेष यांचा मागोवा घेता येऊन त्या स्तूपाच्या स्वरूपाचा आणि त्याच्या परिघाचा व व्यासाचा अंदाज बांधण्यास मदत होते. महाश्मयुगीन शिळावर्तुळांचे उत्खनन वृत्तपाद पद्धतीने करण्यात येते. यात वर्तळाचे चार भाग करून त्यांतील एकमेकांसमोरचे भाग आधी खणण्यात येतात. यामुळे सलग छेद उपलब्ध होऊन शिळावर्तुळाची रचना व त्यात टाकलेल्या वस्तूंचा अनुक्रम कळून येतो. नगरीच्या स्थळाचे उत्खनन खड्ड्यांची जाळी आखून करण्यात येते. तटबंदीयुक्त नगरीचे उत्खनन तटबंदी व नागरी वस्ती यांना जोडणाऱ्या खड्ड्यांचे उत्खनन करून पूर्ण करण्यात येते. यामुळे तटबंदीच्या बंधणीतील विविध अवस्था व नागरी वस्तीच्या विविध अवस्था यांचा एकमेकींशी मेळ घालता येतो.

आधुनिक उत्खनन-तंत्र स्तरनिबद्ध व क्रमनिबद्ध व क्रमनिबद्ध असल्याने, उत्खननाच्या आखणीत निरनिराळ्या ठिकाणी छेद उपलब्ध करून ते शेवटपर्यंत टिकविणे महत्त्वाचे ठरते. कारण स्तरीय छेदांच्या उपलब्धीमुळेच निरनिराळ्या वास्तूंचा क्रम, त्यांचा सापेक्ष काळ व त्यांचा एकमेकींशी असणारा वा नसणारा संबंध कळून येण्यास मदत होते. याशिवाय असे संलग्न छेद ठेवण्यासाठी उत्खनित विभागांत पायरस्ते ठेवल्याने कोणत्याही विभागात पाहणीसाठी चटकन जाता येते.

आधुनिक उत्खननात व्हिलर पद्धतीनुसार खड्ड्यांची आखणी करण्याचा प्रघात पडला आहे. या पद्धतीत सबंध टेकाडावर लाकडी खुंट्या ठोकून चौरस खड्ड्यांच्या जाळीची आखणी केली जाते. अशा चौरसांत चारी बाजूंस मर्यादित जागा सोडून प्रत्यक्ष उत्खननास योग्य अशा खड्ड्यांची योजना केली जाते. या पद्धतीचे दोन फायदे असतात : पहिला फायदा, उत्खनन कोणत्याही दिशेने वाढविता येते आणि दुसरा फायदा, अनेक ठिकाणी स्तरछेद उपलब्ध होऊन उत्खननाच्या कोणत्याही भागात सुलभपणे या छेद भिंतींवरून जाता येते. ही पद्धती सर्वत्र मोठ्या प्रमाणावर अवलंबिली जात आहे.

उत्खनित खड्ड्याच्या दोन्ही बाजूंस समांतरपणे चौकनी लाकडी खुंट्या सु. पाव मीटर अंतरावर ठोकण्यात येतात. यामुळे शून्य खुंटीपासून मोजमापे घेणे सुलभ जाते. प्रत्येक अवशेषाचे त्रिमितिमापन करण्यास या खुंट्या अपरिहार्य ठरतात. खुंटीपासून लांबी, रुंदी व पातळीपासून खोली हे तीन घटक त्रिमितीमापनात येतात. प्रत्येक वेळी खड्ड्यांच्या माथ्यापासून खोली मोजणे अवघड जाते. म्हणून एका विशिष्ट पातळीपासून दर दीड मीटरवर वा एकेका मीटरवर खिळे, दोरा व पाणसळी यांच्या साहाय्याने गृहीतरेषा छेदाच्या भितींवर ठोकाव्यात. या गृहीतरेषांच्या साहाय्याने उत्खनित वस्तूची खोली मोजणे सुलभ जाते.

पुरातत्त्वीय उत्खननाचा मुख्य हेतू मानवी संस्कृतीच्या विकासाचा सर्वंकष पुरावा मिळविणे हा असल्याने, असा पुरावा प्राचीन वस्त्त्यांचे अवशेष असलेल्या टेकडावर कोणत्या ठिकाणी मिळेल याचा विचार, उत्खनन योजताना करणे आवश्यक ठरते. या दृष्टीने टेकडावरील सर्वांत उंच व अविकृत जागा निवडली जाते. यामुळे जास्तीतजास्त वस्त्यांचा पुरावा अविकृत स्वरूपात उपलब्ध होऊ शकतो. मात्र ही उंच जागा वा इतर योग्य स्थळ निवडण्याआधी त्या टेकाडाचा व त्याच्या परिसराचा परिघीय आलेख तयार करणे आवश्यक असते. या आलेखामुळे टेकडाच्या उंच-सखल पातळ्या ताबडतोब लक्षात घेऊन निरनिराळ्या जागी उत्खननाचा उद्देश ध्यानी घेऊन खड्ड्यांची आखणी करता येते.

उत्खनन सुरू करण्या आधी त्यासाठी आवश्यक असणारे अर्थसाहाय्य, उपकरणे व तज्ञांची संघटना यांची तयारी करणे आवश्यक ठरते. याशिवाय उत्खननाच्या काळात सदैव हजर असणारे निरीक्षकही मोठ्या संख्येने मिळवावे लागतात. यासाठी विद्यापीठातील पुरातत्त्व विद्या विषयातील स्नातकोत्तर विभागाचे विद्यार्थी, शिकाऊ निरीक्षक म्हणून उपयोगी पडतात. उत्खननाच्या निदेशकावर सबंध उत्खननाची योजना करणे, त्यात सुसूत्रता ठेवणे, अवशेषांची नोंदणी व्यवस्थित होत आहे, हे पाहणे व निरनिराळ्या तज्ञांकड़ून सुयोग्य ती मदत मिळविणे, त्याचप्रमाणे उत्खनन शिबिराची प्रशासनविषयक व्यवस्था चोख ठेवणे, या विविध कामांची जबाबदारी येऊन पडते.

उत्खननासाठी हाती घेण्यात येणाऱ्या खड्ड्याच्या कामाची सुरुवात अत्यंत काळजीपूर्वक करावी लागते. स्तरवार उत्खननात स्तरांचे स्वरूप अज्ञात असल्याने, योजलेल्या खड्ड्यांच्या एका कोपऱ्यात १ मी. × १ मी. असा भाग निवडून तो अत्यंत काळजीपूर्वक खणतात. या खणण्यातून पहिल्या थराचे स्वरूप जाणून घेतल्यावर मगच संबंध खड्ड्यात तो थर खणला जातो. त्यानंतर या लहान ‘चाचणी’ अथवा ‘नियामक’ खड्ड्यात खणून दुसऱ्या थराचे स्वरूप जाणून घेतले जाते. यामुळे थरांची म्हणजेच पर्यायाने स्तरांतील अवशेषांची सरमिसळ होत नाही व प्रत्येक थरातील अवशेष त्या त्या थरानुसार वेगळे ठेवता येतात.

उत्खनकाने प्रत्येक थराचे स्वरूप, त्याचे घटक, रंग, पोत आणि वैशिष्ट्ये यांची नोंद करणे आवश्यक असते. प्रत्येक थराचा माथा व बूड हे सुरीच्या टोकाने रेघ मारून स्पष्ट केले जातात व प्रत्येक थराला क्रमांक दिला जातो. त्या त्या क्रमांकाची चिठ्ठी प्रत्येक थरावर खिळ्याच्या साहाय्याने ठोकतात. उत्खनित खड्ड्याचा छेद सरळसोट ठेवणे आवश्यक असते त्यामुळे त्याचे छायाचित्रण करणे सुलभ जाते.

प्रत्यक्ष उत्खननासाठी कुदळ, फावडे, छोटे फावडे, सुऱ्या विविध प्रकारच्या कुंचले, ओळंबा, घमेली इ. साहित्य जरूर असते. सबंध खड्डा एकदम न खणता, त्याचे लहानलहान चौरस आखून ते खणले जातात. खणलेली माती अत्यंत काळजीपूर्वक चाळून, पाहून जे जे अवशेष मिळतील ते ते सर्व निवडून बाजून ठेवून त्या प्रत्येक अवशेषला चिठ्ठी बांधली जाते. या चिठ्ठीवर उत्खनित स्थलाचे नाव, दिनांक, वस्तूचा प्रकार ज्यापासून ती वस्तू बनविली गेली त्या पदार्थाचे  नाव, शून्य खुंटीपासूनची लांबी, रुंदी, खोली व स्तरक्रमांक इत्यादींची अचूक नोंद करणे आवश्यक असते.

काही वैशिष्ट्यपूर्ण अवशेषांची नोंदणी त‌त्‌‌‌‌‌‌‌‌‌‌‌स्थलीच करणे आवश्यक असते. उदा., मानवी वा प्राण्यांचा सांगाडा, वैशिष्ट्यपूर्ण मृत्पात्री व नाणे याकरिता छायाचित्रणाचा व आरेखनाचा उपयोग केला जातो. या सर्वांची अचूक नोंद निरीक्षकाने आपल्या नोंदवहीत करणे महत्त्वाचे असते. सांगाड्यासारखा अद्वितीय पुरावा सापडल्यास शिकाऊ उमेदवारांना बाजूस करून जबाबदार निदेशकाने तो पुरावा अत्यंत काळजीपूर्वक उघडा करावा.

उत्खननात विशेषत: भारतीय आणि मध्यपूर्वेकडील भागांत मृत्पात्रांचे अवशेष फार प्रमाणात आढळतात. त्या प्रत्येकाला चिठ्ठी बांधून ठेवणे शक्य नसते व आवश्यकही नसते. याकरिता खापर चौकाची योजना केली जाते. लहानलहान दगड गोटे लावून एक चौरस मी. आकाराच्या चौकाची जाळी याप्रमाणे जाळ्या तयार करण्यात येतात. यांतील प्रत्येक चौरस एका थराचे प्रतिनिधित्व करतो. याप्रमाणे पहिल्या थरातील खापरे पहिल्या चौकात, दुसऱ्या  थरातील दुसऱ्या चौकात अशा तऱ्हेने टाकली जातात. ती क्षारविरहीत पाण्याने व मऊ कुंचल्याने साफ करून अभ्यासासाठी तेथेच ठेवली जातात. यानुसार कोणत्या थरात कोणती खापरे सापडली, त्यांची संख्या, पोत, त्यांवरील चित्रकारी, त्यांचे आकार, त्यांची  बनावट या सर्वांची माहिती करून घेता येते. वैशिष्ट्यपूर्ण व ज्यांचा आकार पूर्ण करत येईल, ती त्याच चौकात वेगळी ठेवली जातात. प्रत्येक खापरावर आतल्या पृष्ठभागावर ते खापर ज्या ठिकाणी सापडले त्याची पूर्ण नोंद व क्रमांक पक्क्या काळ्या शाईने सुबकपणे लिहिला जातो. अशा तऱ्हेने वृत्तांत लिखाणास योग्य अशी खापरे थरानुसार कापडी पिशव्यांत बांधून त्यांवर स्थलनिदर्शक चिठ्ठ्या बांधण्यात येतात.

उत्खनित पुराव्याचे आरेखन व छायाचित्रण अचूक व समजण्यास सुयोग्य त्याचप्रमाणे प्रत्यक्ष उत्खनित स्थळी करणे अपरिहार्य ठरते. इतर पुरावा अभ्यासासाठी इतरत्र हलविता येतो परंतु उत्खनित वास्तु- अवशेष तसे हलविता येत नसल्याने सुयोग्य प्रमाणात त्याचे आरेखनआलेख व छेद करणे क्रमप्राप्त ठरते.

उत्खननाच्या ठिकाणी प्राथमिक प्रयोगशाळा असणे फलदायी ठरते. काही अवशेष अत्यंत ठिसूळ अवस्थेत सापडतात. त्यांना तत्‌स्थलीच सुरक्षित करणे व मजबूत करणे आवश्यक असते. काही अवशेष– उदा., नाणी– त्याठिकाणी स्वच्छ करणे महत्त्वाचे ठरते. याकरिता मूलभूत रसायने व उपकरणे यांनी सुसज्ज क्षेत्रीय प्रयोगशाळा उभारणे अपरिहार्य ठरते.

प्रयोगशाळेप्रमाणेच छायाचित्रण कसे झाले आहे, हे ताबडतोब पाहण्यासाठी क्षेत्रीय छायाचित्र प्रक्रिया शाळा सुसज्ज असणे अत्यंत आवश्यक असते. उत्खनित पुराव्याचे छायाचित्रण केल्यावर ते चित्रण कसे झाले आहे हे प्रक्रिया् करून पाहण्या आधीच तो पुरावा खणून काढून संदर्भरहित केला गेला व छायाचित्रण चांगले झाले नाही, असे नंतर आढळून आले तर ती मोठी चूक ठरते. कारण तो पुरावा छायाचित्रणासाठी स्वस्थानी सुयोग्य संदर्भात पुन्हा ठेवता येत नाही. म्हणूनच छायाचित्रण, निदान महत्त्वपूर्ण अवशेषांचे, त्यात स्थळी करून ते यशस्वी झाले आहे किंवा नाही, हे ताबडतोब पारखून घेणे सयुक्तिक ठरते.

उत्खननात मानवाने बनविलेल्या वा वापरलेल्या अनेक प्रकारच्या वस्तू उपलब्ध होतात. वास्तू, अलंकार, मृत्पात्रे, शस्त्रे, दफने, खेळणी, धान्य वा धान्याचे ठसे, मातृका, मूर्ती, नाणी, जनावरांची हाडे, सूक्ष्म पराग अशा विविध तऱ्हेचा पुरावा सर्वसाधारणपणे उपलब्ध होतो. अर्थात हे सर्व त्या उत्खनित स्थळाच्या स्वरूपावर अवलंबून असते परंतु या विविध प्रकारच्या पुराव्यांचा अभ्यास व त्यांचा अर्थबोध एकाच तज्ञाला वा उत्खननाच्या निदेशकाला होईल, अशी शक्यता फार कमी असते. याकरिता उत्खननाच्या कामी विविध शास्त्रज्ञांची त्याचप्रमाणे तंत्रज्ञांची संघटना मदत अपरिहार्य झालेली आहे. सर्वेक्षक, छायाचित्रकार, आरेखक, यांबरोबर मृत्पात्रज्ञ, पुरावनस्पतीशास्त्रज्ञ, मानवशास्त्रज्ञ, इतिहासज्ञ, अभियंता, जतनशास्त्रज्ञ, पर्यावरणतज्ञ, भूवैज्ञानिक, रसायनतज्ञ, पुराभिलेखवेत्ता, प्राणिशास्त्रज्ञ इ. अनेकांची मदत लागते. याशिवाय उत्खनन शिबिराची व्यवस्था चोख ठेवणारे कारभारी, उत्खनित पुरावा नीट आवेष्टन करून बांधणारे तज्ञ, अर्थव्यवस्था सांभाळणारे कर्मचारी, त्याचप्रमाणे संपर्क अधिकारी यांचीही मदत पुरातत्त्वीय उत्खननाच्या कामी मोलाची ठरत आहे. पुरातत्त्वीय संशोधन हे एकट्यादुकट्याचे काम राहिले नसून ते सांघिक संशोधन झालेले आहे. याशिवाय सर्वसामान्य जनतेत या संशोधनाबाबत फार मोठे कुतुहल व जिज्ञासा उत्पन्न झाली असल्याने अशा संशोधनात उपलब्ध झालेली माहिती जनतेपर्यंत पोहचविण्याचे कार्य आवश्यक ठरलेले आहे.

पुरातत्त्वीय उत्खननाचे संपूर्ण वृत्तांत छायाचित्रांसह लवकरात लवकर प्रसिद्ध करणे व उत्खनन चालू असता प्रदर्शने भरवून विद्यार्थ्यांना व इतरांना त्या संबंधी माहिती देणे हे उत्खननाच्या प्रसिद्धीच्या दृष्टीने फार आवश्यक आहे. या दोन्ही बाबतींत पुण्याच्या डेक्कन कॉलेज ऑफ पोस्ट- ग्रॅज्युएट अँड रिसर्च इन्स्टिट्यूटने अत्यंत प्रशंसनीय कामगिरी बजाविली आहे.

पुरातत्त्वीय उत्खननांच्या बाबतीत भारताने बरीच प्रगती केली असली, तरी अद्याप या क्षेत्रातील संशोधनाला अधिक वाव आहे. जनरल अलेक्झांडर कनिंगहॅम, सर जॉन मार्शल, माधो स्वरूप वत्स, रावबहादूर का. ना. दीक्षित, सर मार्टिमर व्हीलर, अमलानंद घोष, बी. बी, लालं, म. न. देशपांडे, ह. धी. सांकलीया इ. पुरातत्त्वज्ञांनी या क्षेत्रात उल्लेखनिय कामगिरी केली आहे. पुणे, सागर, प्रयाग, वाराणसी, बडोदे, पाटणा व कलकत्ता येथील विद्यापीठांनी पुरातत्त्वीय उत्खनने भारतातील विविध भागांत केली असली, तरी पाश्चिमात्य राष्ट्रांच्या संशोधन संस्थांच्या तुलनेत तांत्रिक व शास्त्रविषयक बाबींत सुधारणा होण्यास बराच वाव आहे. भारतात फक्त अहमदाबाद व लखनौ येथेच कार्बन–१४ पद्धतीने कालमापन करणाऱ्या प्रयोगशाळा आहेत. इतर शास्त्रीय कालमापन पद्धतींचा वापर भारतात अद्यापि व्हावयाचा आहे. तसेच उत्खनित मातीतून ‘फ्लोटेशन’ तंत्राने धान्य बीजांचा वा परागांचा आढळ करून घेणे, हे तंत्रसुद्धा भारतात फार कमी प्रमाणावर आतापर्यंत केले गेले आहे. पर्यावरणीय संशोधन सुद्धा फारसे प्रगत झालेले दिसत नाही. संख्यातंत्र पृथक्करणावरून धातुविज्ञान, वसाहतविज्ञान इ. क्षेत्रांत अमेरिकन तंत्रज्ञ पुरातत्त्व संशोधनात मोलाची कामगिरी करीत आहेत. कदाचित भारतात झालेले आतापर्यंतचे उत्खनन बऱ्याच प्रमाणात प्राचीन भारतीय संस्कृती व प्राचीन अभिजात वाङ्‌मय यांच्या अभ्यासकांनी केल्यामुळे त्यांत शास्त्रीय दृष्टीकोन आला नसावा.

पुरातत्त्वीय उत्खनन-संशोधनात सागरी पुरातत्त्वविद्या या एका नव्या शाखेचा उदय झाला आहे. जमिनीखालच्या संशोधनाप्रमाणेच सागराच्या पोटात शिरून बुडालेल्या प्राचिन अवशेषांचा शोध घेणे, त्यांचे छायाचित्रण व आरेखन करणे, ही कामे सागरी पुरातत्त्वविद्या या शाखेकडून अपेक्षित आहेत. विसाव्या शतकाच्या सुरुवातीस इलायस स्टेडीएटिस या ग्रीक नावाड्याला क्रीट बेटाजवळ असलेल्या अंदिकिथिर या बेटानजीक समुद्रात बुड्या मारताना अचानकपणे समुद्रात बुडालेल्या रोमन अवशेषांचा शोध लागला. त्यानंतर भूमध्यसमुद्रातही या सागरी पुरातत्त्वाने बुडालेली अनेक रोमन जहाजे, मद्यकुंभ, पुतळे इत्यादींचा शोध लावला गेला.गेल्या काही वर्षांत फ्रान्स व इटलीच्या किनारपट्टीचे समुद्रात बुडालेल्या भागांचे शास्त्रीय नकाशे तयार करण्यात येऊन त्यांत प्राचीन काळी बुडालेल्या अनेक नावांची व जहाजांची जागा दाखविण्यात आली आहे. ॲल्फ्रेद मेरलँ, एम्.सी. हान आणि झाक-इन्ह कोस्तू या संशोधकांनी सागरी पुरातत्त्वाविषयक संशोधन अद्यापि झालेले नाही. ते झाल्यास काही प्राचीन बंदरांचा शोध लागू शकेल, असे तज्ञांचे म्हणणे आहे.

गेल्या दोन शतकांत विविध देशांत असंख्य उत्खनने झाली. त्यांपैकी शास्त्रीय व पुरातत्त्वीय अवशेषांच्या दृष्टीने महत्त्वाची उत्खनने पुढील प्रमाणे होत : महत्त्वपूर्ण पुरावा व तांत्रिक अचूकपणा या दृष्टीने अन्यांग (चीन), अर (इराक), जेरीको (पॅलेस्टाइन), जोमोन (जपान), ट्रॉय (तुर्कस्तान), नॅकदा (ईजीप्त), तेरा अमाता (फ्रान्स) व पॉँपेई (इटली), भारतात कालिबंगा, अहाड व बागोर (राजस्थान), हस्तिनापूर, अहिच्छत्र (उत्तरप्रदेश), नावडातोडी (मध्यप्रदेश), इनामगाव (महाराष्ट्र), टेक्कलकोटा (कर्नाटक) ही उत्खनने उल्लेखनीय आहेत. (चित्रपट २९).

संदर्भ : 1. Atkinson, R. J. C. Field Archaeology, London, 1950.

2. Ceram, C. W. A Picture History of Archaeology, London,1958.

3. Charles- Picard, Gilbert, Ed. Larousse Encyclopedia of Archaeology, New York, 1972.

4. Clark, G. Prehistoric Societies, London, 1965.

5. Crawford O. G. S. Archaeology in the Field, London, 1953.

6. Daniel, Glyn, A Hundred and Fifty Years of Archaeology, London, 1972.

7. Leone, M. P. Ed. Contemporary Archaeology, London, 1975.

8. Roy, S. Indian Archaeology from Jones to Marshal : Ancient India No.9, Delhi. 1953.

9. Taylo, Joan du Plat, Marine Archaeology, London, 1965.

10. Wheeler, R. E. M. Archaeology from the Earth, London, 1961.

११. देव, शां. भा. पुरातत्त्वविद्या, पुणे, १९७६.

देव, शां. भा.

पुरातत्त्वीय उत्खनने
पुरातत्त्वीय उत्खनने
जोर्वे संस्कृती

अंतर्गत दाखल केले

पूर्व-आधुनिक कला

प्रथम प्रकाशित

२९ ऑगस्ट २०२३


दुसऱ्या सहस्राब्दीच्या मध्यापासून ते इ.स. १००० पर्यंत चाल्कोलिथिक काळात , जोर्वे संस्कृती ही सध्याच्या महाराष्ट्रात केंद्रित असलेली एक सांस्कृतिक मालिका आहे. ही संस्कृती माळवा संस्कृतीशी जोडलेली होती आणि त्यानंतर आली आणि असे मानले जाते की माळवा संस्कृती समुदायांच्या दख्खन प्रदेशात स्थलांतरातून ती उद्भवली आहे, जिथे ते विद्यमान नवपाषाण कृषी समुदायांच्या संपर्कात आले, ज्यामुळे सांस्कृतिक संश्लेषण झाले. या संस्कृतीचे पुरावे प्रथम १९५०-५१ मध्ये महाराष्ट्रातील जोर्वे येथे उत्खननादरम्यान सापडले, ज्यावरून या संस्कृतीचे नाव पडले आहे. 

मध्य महाराष्ट्रातील प्रवरा-गोदावरी खोरे हे जोर्वे संस्कृतीचे केंद्र मानले जाते. ही संस्कृती सध्याच्या महाराष्ट्राच्या बहुतेक भागात पसरली होती, किनारी कोकण प्रदेश वगळता, पूर्वेला विदर्भातील पूर्णा खोऱ्यापासून पश्चिमेला पुण्याजवळील थेऊरपर्यंत आणि उत्तरेला खानदेश प्रदेशापासून दक्षिणेला वरच्या कृष्णा खोऱ्यापर्यंत पसरलेली होती. संस्कृतीची सर्वात प्रमुख ठिकाणे म्हणजे दैमाबाद, नेवासा, बहल, प्रकाश, चांडोली, सोनगाव, थेऊर आणि इनामगाव, ज्यामध्ये प्रकाश, दैमाबाद आणि इनामगाव हे वस्ती क्षेत्राच्या बाबतीत सर्वात मोठे होते. प्रमुख ठिकाणे नदीच्या खोऱ्यात होती, ज्यात तापी खोऱ्याजवळ प्रकाश, गोदावरी खोऱ्यात दैमाबाद आणि भीमा खोऱ्यात इनामगाव होते. 

ही संस्कृती त्याच्या विशिष्ट मातीकामासाठी ओळखली जाते, जी पूर्वीच्या मालवा संस्कृतीपेक्षा अधिक परिष्कृत दर्जाची होती. जोर्वे संस्कृतीची मातीकाम दोन प्रकारची होती - वैशिष्ट्यपूर्ण काळी-लाल मातीकाम आणि खरखरीत लाल किंवा राखाडी भांडी. पहिली मातीकाम जलद चाकावर फिरवलेल्या आणि चांगल्या प्रकारे बेक केलेल्या बारीक कापडाची होती. या मातीकामाच्या लाल/नारिंगी पृष्ठभागावर काळ्या रंगद्रव्यात भौमितिक नमुन्यांचा रंग होता. या शैलीमध्ये बनवलेल्या वस्तूंमध्ये कॅरिनेशनसह अवतल बाजू असलेला वाडगा, भडकणारे तोंड असलेल्या नळीच्या आकाराचा लोटा आणि उंच मानेचे भांडे यांचा समावेश होता. लाल किंवा राखाडी भांडी खरखरीत कापडाने बनवली जात असे आणि साठवणुकीच्या भांड्या, वाट्या, बेसिन आणि वातीसाठी कोनाड्या असलेले दिवे यासारख्या दैनंदिन वस्तूंसाठी वापरली जात असे. लाल किंवा राखाडी भांड्यांना कधीकधी काठावर लाल गेरूने प्रक्रिया केली जात असे, तर खरखरीत भांड्यांवर छेदन आणि अ‍ॅप्लिक नमुने होते. विद्वानांचे असे मत आहे की दोन्ही प्रकारच्या मातीकामांवर अनुक्रमे मालवा आणि दक्षिणेकडील नवपाषाण संस्कृतींचा वेगळा प्रभाव दिसून येतो. 

जोर्वे संस्कृतीतील कुंभारकाम करणारे कारागीर एका विशेष भट्टीचा वापर करत असत, जी दगडी पायावर बांधलेली मातीची एक मोठी कुंड होती, ज्याचा व्यास १.७५ मीटर होता. अग्निकुंड भट्टीच्या पायथ्याशी होता आणि त्यावर वरून ६० मीटर खोलीवर मातीच्या गाद्या ठेवल्या होत्या. गरम वायूसाठी आउटलेट हवेच्या नळ्या आणि खोबणी तसेच मातीच्या गाद्यांवर छिद्रांच्या स्वरूपात प्रदान केले गेले होते. 

जोर्वे संस्कृतीची घरे मालवा संस्कृतीच्या घरांचे अनुकरण करत होती, ज्यामध्ये आयताकृती आराखडे, भिंती आणि शंकूच्या आकाराचे बांधकाम होते. घरांमधील अंतर गल्ल्यांचे सीमांकन करण्यात काही प्रमाणात नियोजन असल्याचे सूचित करते. इनामगाव येथे, वस्तीचा पश्चिमेकडील भाग कारागिरांचे निवासस्थान म्हणून काम करत होता, उत्खननात कुंभारकाम, हस्तिदंती कोरीवकाम, तांबे आणि सोने आणि चुना बनविण्याचे काम करणारे तज्ञ असल्याचे पुरावे मिळाले आहेत. इमारतींच्या दुरुस्तीच्या पुराव्यावरून इनामगावच्या मध्यवर्ती भागातील घरे कदाचित श्रीमंत व्यक्तींची असतील. दैमाबादमध्ये मातीपासून बनवलेल्या बुरुजासह तटबंदीच्या भिंतीचेही अवशेष होते. 

शेती, शिकार आणि मासेमारी हे उदरनिर्वाहाचे प्राथमिक स्रोत होते. बार्ली आणि गहू ही मुख्य पिके होती आणि पाळीव प्राण्यांमध्ये गायी, म्हशी, शेळ्या, मेंढ्या आणि डुक्कर यांचा समावेश होता. पाळीव आणि शिकार केलेले दोन्ही प्राणी खाल्ले जात होते आणि इनामगाव येथे आढळणाऱ्या मोठ्या अग्निकुंड्यांमध्ये शिजवले जात होते. 

या संस्कृतीत प्रामुख्याने दगडी हत्यारे वापरली जात होती आणि त्यात विशेष ब्लेड आणि फ्लेक उद्योग होता, ज्यामध्ये चाल्सेडनी आणि अ‍ॅगेट सारख्या साहित्याचा वापर केला जात असे. तांबे आणि कांस्य यांचा वापर मर्यादित होता आणि त्यात कुऱ्हाडी, माशांच्या हुक, छिन्नी आणि चाकू यासारख्या अवजारांचा समावेश होता. इनामगावच्या जागेवरून चाल्सेडनीमधून तांबे काढण्यासाठी बांधलेल्या एका विशेष भट्टीचे पुरावे मिळाले, जे सध्याच्या इस्रायलमध्ये उत्खनन केलेल्या कांस्ययुगीन भट्टींशी शैलीत्मक साम्य दर्शवते. संस्कृतीच्या कलाकृतींमध्ये सूक्ष्म दगड, तांब्याच्या वस्तू, मणी आणि टेराकोटाच्या मूर्तींचा समावेश होता. टेराकोटाच्या कलाकृतींमध्ये घोड्याने ओढलेल्या रथाचे चित्रण करणारा एक सिलेंडर सील होता. वैयक्तिक दागिन्यांमध्ये कवच, हस्तिदंत आणि तांब्याच्या बांगड्या तसेच चाल्सेडनी, अ‍ॅगेट, जास्पर आणि कार्नेलियनपासून बनवलेले दागिने समाविष्ट होते.

विद्वानांच्या मते, सोनेकाम आणि हस्तिदंतीतील कारागिरांची उपस्थिती, तसेच दागिन्यांमध्ये शंखाचा वापर यावरून असे सूचित होते की जोर्वे संस्कृतीचा आसपासच्या प्रदेशांशी संपर्क होता. शंख कच्छ आणि कोकण किनाऱ्यांवरून आला असावा आणि हस्तिदंत आणि सोने सध्याच्या कर्नाटकातून आले असावे. इनामगाव आणि दैमाबाद ही मातीकामाची केंद्रे देखील असू शकतात, जी संस्कृतीच्या इतर ठिकाणी वस्तूंचा पुरवठा करत असत. मध्य प्रदेशातील नवदातोली आणि कर्नाटकातील टी नरसीपुरा येथे जोर्वे मातीकामाची उपस्थिती उत्तर आणि दक्षिणेकडील प्रदेशांशी सांस्कृतिक संबंध असल्याचे सूचित करते. 

या ठिकाणाहून सापडलेल्या काही टेराकोटाच्या वस्तूंना धार्मिक किंवा धार्मिक महत्त्व असल्याचे मानले जाते. इनामगाव आणि नेवासा येथे भाजलेल्या आणि न भाजलेल्या मातीपासून बनवलेल्या मूर्ती आढळल्या, ज्या महिलांच्या आकृत्या दर्शवितात असे मानले जाते. नेवासा येथे सापडलेल्या एका उल्लेखनीय आकृतीचा आकार देठासारखा होता, ज्याच्या वरच्या बाजूला डोके दर्शविणारा एक चिमटा होता, छाती दर्शविणारी चिमटा असलेली माती आणि हातांसाठी वक्र आकृत्या होत्या. या व्यतिरिक्त, त्या ठिकाणी बैल, डुक्कर, घोडा आणि घुबड यांच्या मूर्ती सापडल्या. इनामगाव येथे, एका घरात दोन आकृत्या सापडल्या, ज्यांचे स्तन हे एकमेव तपशीलवार शारीरिक वैशिष्ट्ये होती; त्यापैकी एक आकृती एका अंडाकृती पात्रात बसवली होती ज्यावर डोके नसलेली मादी मूर्ती आणि बैल ठेवण्यात आला होता. विद्वानांच्या मते, दोन्ही मादी मूर्ती देवीचे चित्रण मानल्या जाऊ शकतात. डोके नसलेल्या मूर्ती आणि बैलाच्या शरीरावर देखील कोनाडे होते जे एकत्र जोडल्यावर बैलावर बसलेली मूर्ती दर्शवितात. 

त्यांनी मुलांसाठी कलश दफन करण्याची पद्धत अवलंबली. प्रौढांना लांब स्थितीत पुरले जात असे आणि त्यांचे पाय घोट्याच्या खाली कापले जात असत, कदाचित व्यक्तीचा आत्मा जिवंत जगात जाऊ नये म्हणून. दफन खड्ड्यांमधून रंगवलेल्या जोर्वे भांड्यांचे पुरावे देखील मिळाले ज्यामध्ये मृतांसाठी अन्न आणि पाणी ठेवले गेले असावे.

सुमारे १००० ईसापूर्व या संस्कृतीचा अचानक ऱ्हास सुरू झाला, जो फक्त इनामगाव येथेच सुरू राहिला, जिथे मातीकाम आणि वस्त्यांमध्ये दर्जा आणि घरांच्या आकारात घसरण झाल्याचे संकेत दिसू लागले. विद्वानांच्या मते, ही घसरण वाढत्या दुष्काळ किंवा दुष्काळासारख्या हवामान घटनेचा परिणाम असू शकते, ज्यामुळे लोकसंख्येचे स्थलांतर झाले असावे. याव्यतिरिक्त, काळ्या आणि लाल भांड्यांच्या उपस्थितीवरून विद्वान दक्षिण दख्खनशी सुमारे ८०० ईसापूर्व संपर्क साधण्याचा सल्ला देतात. 

thinkmaharashtra.com
जोर्वे-नेवासे संस्कृती (Jorve-Newase Civilization) | थिंक महाराष्ट्र
See author's posts
10–12 minutes


हाताशी एक आठवडा होता. अचानक अहमदनगरला जायचे ठरवले. दोन दिवस अहमदनगरमध्ये काढायचे आणि नंतर आजूबाजूला फिरायचे असा बेत होता. नगरमध्ये फिरून झाले मग विचार केला की या फेरीत जोर्वे, नेवासे अशी दोन गावेही पाहून घ्यावी. नकाशावर पाहिले, अंतरही फार नव्हते. अनेक वर्षांपासून ती गावे पाहायचे राहून गेले होते. अगदी राहूरीपर्यंत येऊनही नेवाशाला जाणे झाले नाही. नेवाशाला जाऊन पैसाच्या खांबापाशी थोडा वेळ बसायचे होते. यज्ञाच्या राखेत लोळल्यावर, धर्मराजाच्या मुंगुसाच्या अंगाला जसे चारदोन सोन्याचे कण चिकटले होते, तसे पैसाच्या खांबापाशी सापडलेच चारदोन बावनकशी शब्द तर गोळा करायचे होते.

बरोबर चार मैत्रिणी होत्या. नगरमध्ये फिरून झाल्यावर, नेवाशाला जाऊन मुक्काम करायचे ठरले. लगेच निर्णयाची अंमलबजावणी झाली. दुसऱ्या दिवशी सकाळी उठून कवी आणि तत्त्वज्ञ असलेल्या महाराष्ट्राच्या माऊलीला वंदन केले. चार घटका तिथे टेकलो. आजूबाजूच्या लोकांशी बोलण्यात वेळ गेला. नेवासे गाव म्हटले तर इतर चार गावांसारखे आहे. पण पैठणला जसा एकनाथांच्या अस्तित्वाचा गंध आहे तसा नेवाशाला ज्ञानेश्वरांच्या अस्तित्वाचा आभास आहे. तसा तो आळंदीतही आहे. ज्ञानदेवांनी इथे ज्ञानेश्वरी लिहिली हे नेवासे गावाचे महत्त्व आहेच पण त्याच बरोबर या गावात ताम्रपाषाण युगातल्या मानवाच्या वसाहतींचा पुरावा सापडला आहे, ही बाब आमच्यासाठी आकर्षणबिंदू होती.

महाराष्‍ट्रातल्या आद्य मानवी वसाहतींची संस्‍कृती ‘जोर्वे-नेवासे’ संस्‍कृती म्हणून ओळखली जाते. ही दोन्ही गावे प्रवरा नदीच्या काठी आहेत. नेवाशाला जिथे उत्खनन झाले आहे ती जागा परतीच्या प्रवासात पाहावी असा विचार करून नकाशावर आधी जोर्वे गावाचा रस्ता शोधायला सुरुवात केली. तेवढ्यात जोर्वेच्या आधी दायमाबाद अशी पाटी दिसली. दायमाबाद हा देखील त्या संस्कृतीतला एक महत्त्वाचा पाडाव. मग आणखी पुढचे काहीच दिसेना. गाडी सरळ दायमाबादच्या दिशेने वळवली. दायमाबाद संगमनेरपासून आठ किलोमीटर अंतरावर, प्रवरा नदीच्या काठी वसलेले आहे. तिथेही ताम्रपाषाण युगातली मातीची भांडी आणि गारगोटीच्या पातळ तुकड्यांची हत्यारे सापडली आहेत. पण संपूर्ण महाराष्ट्रात अशा प्रकारचा पुरातन कालाचा पुरावा पहिल्यांदा जोर्वे येथे सापडला. नंतर नेवासे येथे झालेल्‍या उत्‍खननात ह्या संस्‍कृतीवर अधिक प्रकाश पडला म्‍हणून या संस्कृतीचे नाव ‘जोर्वे-नेवासे’ संस्‍कृती ! ह्या संस्कृतीचा काळ साधारण ख्रिस्‍तपूर्व बाराशे ते पंधराशे वर्षे असावा. इथे सापडलेली भांडी वैशिष्‍ट्यपूर्ण आहेत. ही मातीची भांडी तुलनात्‍मकदृष्‍ट्या पातळ आहेत. भट्टीमध्‍ये उत्‍तम प्रकारे भाजलेली असल्‍यामुळे त्‍यांचा धातूच्‍या भांड्यांप्रमाणे टणटण् आवाज येतो. विटकरी रंगाच्‍या त्या भांड्यांवर इतर पुरातत्त्वीय ठिकाणी आढळणाऱ्या भांड्यांप्रमाणे प्राण्‍यांची चित्रे काढलेली आहेत. क्‍वचित एखाद्या भांड्यावर स्‍वस्तिकाचे चिन्‍ह काढलेले आहे. असे स्‍वस्तिकाचे चिन्‍ह हे महाराष्‍ट्रात इतरत्र किंवा दक्षिण भारतात सापडण्याआधी येथेच प्रथम आढळून आले आहे.

दायमाबादला गावात शिरताना एका टपरीवर पुरातत्त्वीय उत्खनन झालेली जागा कुठे आहे याची चौकशी केली. त्यातल्या एकाने गावाबाहेरच्या रस्त्याच्या दिशेने हात उडवला आणि पुस्ती जोडली, ‘आता तिथे काहीच नाही, मॅडम.’ उत्खननाची जागा सापडायला काही अडचण आली नाही. पुरातत्त्व खात्याचा नेहमीप्रमाणे गंजका, निळा बोर्ड दिसला. जागेला कुंपण आणि उघडे फाटक होते. गाडी सहज आत गेली. पहारेकरी, गाईड वगैरे कोणी आजूबाजूला नव्हते. गाडी आत जातच राहिली. पण मग थोडे पुढे गेलो की नाही, तेवढ्यात एक तरूण माणूस मोटरसायकलवर मागोमाग आला आणि आम्ही कोण, कशाला आलो वगैरे चौकश्या करायला लागला. ज्या टपरीवरून आम्ही पुढे आलो होतो तिथून त्याला खबर गेली होती. पांढरी इनोव्हा गाडी असल्यामुळे सरकारी पाहुणे असावेत अशा समजुतीने तो घाईघाईने आला होता. आम्ही साधे टुरिस्ट आहोत आणि केवळ कुतूहलापोटी उत्खननाची जागा बघायला आलो आहोत असे म्हटल्यावर तो निवांत झाला आणि स्वत:हून आमच्या बरोबर फिरायला लागला. हा दायमाबादच्या उत्खननात सहभागी असलेल्या लाल हुसेन पटेल यांचा मुलगा होता. दायमाबादला 1958-59 पासून 1978-79 पर्यंत चार वेळा उत्खनन झाले आहे. आता ही ‘साईट’ (स्थळ) बंद करण्यात आली आहे.

संस्‍कृतीविषयी इंग्लिशमधून बोलताना दोन वेगवेगळे शब्‍द वापरले जातात – कल्‍चर आणि सिव्हिलायझेशन. सिव्हिलायझेशन हा सिव्हिल म्‍हणजे नागर होण्‍याच्‍या दिशेने झालेला प्रवास, प्रक्रिया आहे तर कल्चर हा त्‍या प्रक्रियेचा आविष्‍कार आहे. मराठीमध्‍ये सरसकट संस्कृती हा एकच शब्‍द वापरला जातो. पण ‘सिंधु संस्‍कृती’ आणि ‘मराठी संस्‍कृती’मधल्‍या ‘संस्‍कृती’ या शब्‍दांच्‍या अर्थामधला फरक संदर्भाने माहीत असतो. नागरीकरण याचाच अर्थ रानटी अवस्‍थेकडून सुसंस्‍कृत होण्‍याची प्रकिया. जीवनाच्‍या विविध अंगांवर होणारे संस्‍कार. सामाजिक, राजकीय, धार्मिक आणि त्‍याबरोबर तंत्रज्ञानामध्‍ये होणारे बदलही.

महाराष्‍ट्रापुरते बोलायचे झाले तर या नागरीकरणाच्‍या प्रवासाच्‍या दिशेने सुरुवात सुमारे दोन ते तीन लाख वर्षांपूर्वी झाली. इथल्या अतिप्राचीन मानवी वसाहतीचे तीन कालखंड पडतात. अश्मयुग, ताम्रपाषाणयुग आणि लोहयुग. इथल्‍या माणसांनी, त्‍यांना मराठी म्‍हणता येणार नाही कारण मराठी ही आपली ओळख जेमतेम बाराशे-तेराशे वर्षे जुनी आहे. आद्य अश्मयुगात म्हणजे साधारण दोन लाख वर्षांपूर्वी तयार केलेल्‍या दगडी हत्‍यारांचे अवशेष गोदावरी, प्रवरा, मुळा-मुठा, तापी, पूर्णा, वर्धा इत्‍यादी अनेक नद्यांच्‍या काठी सापडले आहेत.

ताम्रपाषाण युगात शेतीची माहिती असलेल्‍या, तांब्‍याची आणि दगडी हत्‍यारे वापरणाऱ्या टोळ्या इथे स्‍थायिक झाल्‍या होत्या. ती माणसे गवताने शाकारलेल्‍या कुडाच्‍या झोपडीत राहात होती. शिकार, शेती, पशुपालन, मासेमारी ही त्‍यांच्‍या उपजिविकेची साधने. हे आद्य शेतकरी. गहू, तांदुळ, ज्‍वारी, डाळ अशी धान्‍ये पिकवत असत. जनावरांचे मांस खारवून वाळवून ठेवत असत आणि अंगणात एक खड्डा करून त्‍यात मांस भाजत असत. धान्‍य कुटले जात असे आणि त्‍यासाठी दगडी खल वापरत असत. धान्‍य दळण्‍याचे जाते आपल्‍याकडे इजिप्‍तमधून उशीरा आले. या इजिप्शीयन जात्‍याची वरची तळी उभट असून जड असते. दोन्‍ही तळी सारख्‍या असणारे जाते हे इजिप्शीयन जात्‍याचे विकसित रूप आहे. ‘जोर्वे-नेवासे’ संस्‍कृतीमध्‍ये मृतांना रांजणात घालून पुरण्‍याची पद्धत होती. दफन करताना मोठमोठ्या दगडी शिळांचा आणि फरश्‍यांचा वापर करत असत. मृतांचे स्‍मारक म्‍हणूनही शिळावर्तुळे उभारत. महाराष्‍ट्रभर अनेक ठिकाणीही अशी शिळावर्तुळे आढळून येतात. मृतांच्‍या शेजारी त्‍यांच्‍या परिस्थितीप्रमाणे भांडीकुंडी ठेवत असत. नेवाशाला एक तांब्‍याच्‍या मण्‍यांची माळ रेशमाच्‍या आणि सुताच्‍या धाग्‍यात गुंफलेली सापडली. अशा प्रकारे रेशीम आणि सूत यांचे संमिश्र सूत भारतात प्रथमच सापडले. आद्य शेतकऱ्यांच्‍या भरभराटीला आलेल्‍या या वसाहती वातावरणातल्‍या बदलामुळे इसवी सनपूर्व पाचशेच्‍या आसपास नष्‍ट झाल्‍या असाव्‍यात.



दायमाबादची वसाहत हे उत्तर हडप्पाकालीन संस्कृतीचे स्थळ आहे. तेथे टेराकोटाचे तीन शिक्के (सील) सापडले आहेत, ज्यांच्यावर सिंधू संस्कृतीच्या लिपीतले चिन्ह आहे. मातीच्या भांड्यांच्या काही तुकड्यांवरही सिंधू लिपीतली चिन्हे सापडली आहेत. दायमाबादच्या परिसरात हिंडत असताना हा सर्व इतिहास पाठीशी होता. पटेल यांचा मुलगा घरांची जोती, चपट्या विटांची विहीर, नदीच्या बाजूच्या बांधाचे अवशेष अशा सगळ्या जागा उत्साहाने दाखवत होता. त्याच्या माहितीनुसार इथे सापडलेले अवशेष अनेक ट्रक्समधे भरून पुण्याला नेले. पुण्याला ते नेमके कोणाच्या ताब्यात आहेत याविषयी त्याला माहिती नव्हती. आता ही साईट बंद करण्यात आली आहे तरी खापराचे तुकडे सगळीकडे पसरलेले होते. साडेतीन हजार वर्षांपूर्वीच्या विहिरीत डोकावून पाहताना एक सूक्ष्म थरार जाणवला खरा !

दायमाबादच्या बाबतीत एक नाट्यमय घटना घडली होती. 1974 मध्ये छबू लक्ष्मण भील नावाच्या शेतकऱ्याला त्याच्या शेतातले एक झुडूप मुळासकट काढताना, त्याच्या मुळाशी चार ब्रॉन्झच्या मूर्ती सापडल्या. त्या घेऊन तो गावातले सुशिक्षित आणि सामाजिक कार्यात भाग घेणाऱ्या लाल हुसेन पटेल यांच्याकडे गेला. त्यांनी त्या वस्तू  भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षण विभागापर्यंत पोचवल्या. त्यात एक रथ किंवा बैलगाडी म्हणता येईल असे शिल्प होते. दोन बैल जोडलेल्या या गाड्यावर एक माणूस उभा आहे आणि गंमत म्हणजे गाडी आणि बैल यांच्या मधल्या दांड्यावर एक कुत्रा आहे. याखेरीज हत्ती, म्हैस आणि गेंडा यांचेही गाडे आहेत. त्यातले रथाचे शिल्प सध्या राष्ट्रीय संग्रहालय, नवी दिल्ली येथे आहे तर बाकी शिल्पे मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज वास्तुसंग्रहालयात आहेत.

दायमाबादच्या परिसरात हिंडून झाल्यावर आम्ही पटेल यांच्या घरी गेलो. एम. एन. देशपांडे, एस. आर. राव आणि एस. ए. साळी या तिन्ही पुरातत्त्व शास्त्रज्ञांबरोबर त्यांनी दायमाबादच्या उत्खननात भाग घेतला होता. भारतीय पुरातत्त्व विभागाला सादर करण्यात आलेल्या संपूर्ण अहवालाची प्रत त्यांच्यापाशी होती. ती अपूर्वाईने पाहिली. चहापाणी झाले, घरातल्या लोकांशी गप्पा झाल्या आणि मग तिथून निघालो.

दायमाबादच्या अनुभवाने मग अतिशय उत्साहाने जोर्वे गावात पोहोचलो. तिथेही गावाबाहेर विचारल्यावर पहिली प्रतिक्रिया ‘आता इथे काही नाही’ अशीच होती. तसेच रेटून गावात गेलो. भोवती माणसे जमली, त्यांना विचारले, ‘उत्खननाची साईट कुठे आहे?’ उत्तर आलं. ‘तुम्ही उभ्या आहात तिथेच.’ काहीशा आश्चर्याने आणि काहीशा दु:खी मनाने पायाखाली पाहिले, आजुबाजुला नजर टाकली. तर भराव टाकून लोकांनी छान घरं बांधलेली होती. साईट बंद झाल्यावर तिथे सगळीकडे एकमजली, दुमजली घरांची दाटी झालेली होती. सर्व अवशेष काढून इतरत्र नेल्यावर रिकामे खड्डे ठेवून काय करायचे हा विचार कदाचित योग्यच असेल तरी काहीतरी हरवल्यासारखे वाटले. महाराष्ट्रातल्या ‘पहिल्या मानवी वसाहतींपैकी एक’ असलेल्या जागी, त्या वसाहतीचे अवशेष नाहीत. किंवा कदाचित असेही असेल की वसाहतीच्या जागी आणखी एक वसाहत उभी राहिली. कालचक्र चालू राहिले. ‘मातीवर चढणे एक नवा थर अंती!’

गंमत अशी आहे की महाराष्‍ट्राचा इतिहास म्‍हटला की इथल्या माणसांची दृष्‍टी चारएकशे वर्षांपलीकडे जात नाही. अर्थात ह्या चारशे वर्षांच्‍या इतिहासाच्‍या खाणाखुणाही फार प्रेमाने जपल्या जातात असे नाही. इतिहासामध्‍ये रस असणा-यांसुद्धा जोर्वे, नेवासे, प्रकाशे, सोनगाव, इनामगाव ही नावे अभावानेच माहीत असतात. अनेक ठिकाणी मृतांचे स्‍मारक म्‍हणून उभारलेली शिळावर्तुळे आहेत, सतींच्या शिळा आहेत, वीरगळ आहेत पण गावात रहाणा-या लोकांना त्यांचा संदर्भ माहीत नसतो. अज्ञानच नाही तर अनास्थाही असते. कोणीतरी बालबुद्धीने या शिळांना शेंदूर फासतो आणि मग पुढे पिढ्यानपिढ्या त्यांच्यावर शेंदराचे थर चढत जातात. दगडावर चढलेले असोत की बुद्धीवर; हे चिकट थर खरवडणे तसे अवघडच.

– सुनंदा भोसेकर 9619246941 sunandabhosekar@gmail.com
संदर्भ: महाराष्ट्रातील पुरातत्त्व- हसमुख धी. सांकलिया, मधुकर श्री. माटे
महाराष्ट्र राज्य साहित्य-संस्कृती मंडळ, मुंबई. (1976)

जोर्वे
श्री क्षेत्र जोर्वे दत्त जयंती उत्सव
जोर्वे संस्कृती एक पुरातत्वीय रहस्य
##############
वरून रांगडा कणखर काळा ओबडधोबड मातीचा;
अंतरात परी संत नांदती बोल सांगते मोलाचा.
माझा महाराष्ट्र हा इथे राहणाऱ्या लोकां सारखाच ,शरीराने बलदंड पण मनाने अत्यंत हळवा आहे .हे महाराष्ट्राचे रूप यादव ,चालुक्य ,सातवाहन ,राष्ट्रकूट ,कदंब ,सेंद्रक या राजसत्तांना इतके भावले, की त्यांनी ज्ञान, त्याग ,शौर्य ,ऐश्वर्य, कला-साहित्य यांचा एक एक दागिना हा महाराष्ट्राला घातला. या महाराष्ट्राच्या संपत्ती समोर देवेंद्र याचा दिमाख देखील फिका पडावा एवढीही संपन्नता .या महाराष्ट्राच्या संपत्तीत भर घातली यादव राजांनी म्हणतात, त्या काळातील महाराष्ट्र कसा होता तर ऐश्वर्यसंपन्न होता, इथं काशी सारख ज्ञान होतं ,द्वारके सारखं धन होतं ,राजासारखं मन होतं आणि मनासारखा राजा होता इथे घरांना कुलपे नव्हती, किल्ली हरवयाची चिंता नव्हती चोर शोधूनही सापडत नव्हता. महाराष्ट्र युद्धात गाजत होता ,दह्या दुधात भिजत होता ,दान घ्यायला लाजत होता आणि पांडुरंगाला भजत होता.
बस इथून काय तो माझ्या महाराष्ट्राच्या इतिहासाला सुरुवात होते. आपल्यासमोर महाराष्ट्राचा इतिहास म्हटलं की शिवाजी महाराज ,संभाजी महाराज ,पेशवे ते स्वातंत्र्यसमर एवढेच ती माहिती .काहीजण सातवाहन पर्यंतही जाऊन पोहोचतात .कारण महाराष्ट्राच्या लिखित वर्णनाला इथून सुरुवात होते ,पण याआधी देखील महाराष्ट्र हा होताच ना! त्याच वैभवशाली इतिहासाची पानं आज तुमच्यासमोर उलगडतो.
आपण इतिहासात शिकलो की भारताच्या वायव्येकडे सिंधू ही नागर संस्कृती सापडली .तशी एखादी संस्कृती महाराष्ट्रात सापडलीच नाही का? तर ती सापडली आणि तिचे नाव जोर्वे संस्कृती ..मी मुळचा संगमनेरचा आणि मला या गोष्टीचा अभिमान वाटतोय ,की महाराष्ट्राच्या वैभवशाली इतिहासात भर टाकायचे काम, महाराष्ट्रातील ताम्रपाषाण युगाची जगाला ओळख करून द्यायचे काम हे संगमनेर तालुक्यातील जोर्वे खेड्यापासून झाले. पुरातत्त्व खात्याच्या प्र घाता प्रमाणे ज्या ठिकाणी अवशेष सापडले त्या संस्कृतीला त्या गावाचे नाव देण्यात येते. उदाहरणार्थ =हडप्पा संस्कृती .तसेच या संस्कृतीचे अवशेष प्रथमतः जोर्वे येथे सापडले म्हणून या संस्कृतीला जोर्वे संस्कृती असे म्हणतात.
आदिमानव हा नदीजवळ वस्ती करत असेल .भटक्या अवस्थेत असल्याकारणाने दगडाची हत्यारे करीत असे. जुने झालेले हत्यार तो तेथेच टाकून स्थलांतर करी .नदीच्या गाळामुळे ती हत्यारे बुजवली गेली आणि कालपरत्वे नदीपात्र शुष्क झाल्यावर प्राचीन हत्यारे आणि वसाहती दिसू लागल्या .बहुतांश संस्कृतींचा शोध हा नदिकिनारी लागला. ज्याप्रमाणे धमन्या रक्त पुरविण्याचे काम करतात. त्याचप्रमाणे महाराष्ट्रातील नद्या या महाराष्ट्राचे पोषण करतात. ऋग्वेदामध्ये सिंधू ,सरस्वती ,गंगा या नद्यांना देवता मानून त्यांचे स्तवन केले ले आपल्याला आढळते .या न्यायाने भीमा ,वरदा ,कृष्णा, कोयना ,प्रवरा ,गोदावरी, तापी या महाराष्ट्रातील सप्त गंगाच !!आणि जोर्वे संस्कृती नांदली यांच्याच खुशीत.
शोध=
1948 पर्यंत महाराष्ट्राचा इतिहास हा सातवाहन पर्यंतच मर्यादित होता. पण 1947 ला प्रवरा नदीला मोठा पूर आला. या पुरात गावच नव्हे तर शेती देखील पाण्याखाली गेली .या प्रकोपाला तोंड देण्यासाठी गावाने नदीच्या काठापासून आत चढावर वस्ती हलविली आणि शेती नदीकडे हलविली .आणि एक दिवस अचानक भाजक्या मातीची पात्रे ,मडकी त्यावर नक्षीकाम आणि कुऱ्हाडी ची पाती असा खजिना सापडला ..प्रत्येक गावाला मौखिक गोष्ट असते .त्याचप्रमाणे जोर्वे लाही आहे. म्हणतात ही महाभारतातील जरासंधाची नगरी होती. याला जेऊर ग्राम असे नाव होते .नंतर अपभ्रंशित होऊन ते जोर्वे झाले .लोकांना वाटले की हे पुराण काळातील भांडी असावीत .आणि लागोलाग बातमी पसरली आणि डॉ. एच .डी. सांकलिया यांच्या नेतृत्वाखाली उत्खननास प्रारंभ झाला..
ताम्रपाषाण संस्कृती=
जोर्वे संस्कृती ही ताम्रपाषाण युगातील आहे. या युगात लोखंडाचा शोध लागलेला नव्हता फक्त दगड आणि तांब्याच्या आधारे अवजारे बनवली जात .जोर्वे चा शोध लागल्यानंतर अनेक ठिकाणी उत्खननात समकालीन गोष्टी सापडल्या .दायमाबाद, इनामगाव, नेवासा, चिंचोली ,प्रकाश(नंदूरबार) याठिकाणी उत्खननात साम्य दर्शक गोष्टी सा पडल्यात .ताम्रपाषाण युग हे इसवी सन पूर्व बाराशे लाच संपले ,पण जोर्वे संस्कृतीत ते इसवी सन पूर्व सातशे पर्यंत सापडते...
सुरुवात=
सिंधू संस्कृतीच्या उदयाने अत्यंत प्रगत अशी नागरी संस्कृती प्रकट झाली. सिंधू खोऱ्यात उगम होऊन की गंगा-यमुनेच्या सुपीक पट्ट्यात स्थिरावली .पण काही कारणाने याठिकाणी दुष्काळ जाणवला पाश्चात्य बाजूकडील व्यापार आणि दळणवळण बंद पडले. त्यामुळे हे लोक उदरनिर्वाहासाठी दक्षिणेकडे निघाले. राजस्थान आणि सौराष्ट्र यामार्गे ते दक्षिणेकडे निघाले .या भागात प्रगत पद्धतीची शेती करू लागले आणि शेती करीत असतानाच तापी खो-यातून ते दायमाबाद म्हणजेच महाराष्ट्रात आले. तापी खोऱ्यातील नंदुरबार जवळील प्रकाश येथे त्यांची एक वस्ती सापडते .हे लोक येताना त्यांची दैवते घेऊन आले. त्याच बरोबर सातू ,गहू, ज्वारी ,बाजरी ही धान्ये ही घेऊन आले. मूलतः ज्वारी बाजरी ही धान्य भारतीय नसून पर्शिया जवळील आहेत .पण सिंधू सभ्यतेच्या लोकांच्या पाश्चात्त्य देशांशी असलेल्या संबंधांमुळे ती महाराष्ट्रात आली. दायमाबाद हे ठिकाण तीन ते चार संस्कृतींचे माहेरघर बनले .यामध्ये सिंधू ,माळवा ,सावळग इत्यादी संस्कृतींचे अवशेष सापडले इसवी सन पूर्व सतराशे ते पंधराशे दरम्यान माळवा संस्कृती ही प्रगत झाली .आणि तिचा उल्लेख जोर्वे संस्कृती असा झाला...
वैशिष्ट्ये=
मातीची भांडी=
येथील भांडे म्हणजेच कुंभ ,वाडगे ,थाळ्या या भाजक्या मातीच्या बनवलेल्या असत. जास्त भाजल्यामुळे तांबडा रंग यांना येत असत. भांड्यावर फुले ,पाने आणि मासेमारी करतानाचे दृश्य सापडले आहेत .आणखीन एक वैशिष्ट्य म्हणजेच तोटी असलेल्या भांड्यांचा हे लोक वापर करत होते.
अंतिम संस्कार=
हे लोक अगदी विलक्षण पद्धतीचा अंतिम संस्कार करत असत .लहान बाळाला माठामध्ये भरून ते पुरत होते .तर वयस्कर माणसाला रांजणा मध्ये भरून दक्षिण उत्तर गाडत असत .ते वेळेस डोके दक्षिणेला ठेवत .हे लोक पुनर्जन्मावर विश्वास ठेवत होते कारण पुरताना ते माणसाचे पाय घोट्यापासून कापून टाकायचे .कारण त्यांना अशीच शंका असायची की माणसाचे भूत होऊ नये .पुरताना प्रेतासोबत ते धान्यही गाडत असत. विशेष म्हणजे त्याकाळात स्मशानभूमी नव्हत्या तर हे लोक राहत्या घरातच प्रेताला गाडत होते. गावच्या मुख्य माणसाला रांजणा मध्ये बसवून गाडीत होते .त्यावेळेस त्याचे तोंड उत्तरेला ठेवत होते.
निवास व्यवस्था=
गावाच्या मुख्य माणसाचे घर हे आयताकृती होते. तर बाकीच्या लोकांची घरे ही गोलाकार होती. जमिनीत धान्य साठवण्यासाठी खड्डे केलेले असत आणि त्यावर चुन्याने लेपण असे. हे लोक गावाभोवती तटबंदी बांधत होते. दायमाबाद येथील उत्खननात तटबंदी सापडली .तर इनामगाव येथे तटबंदी आणि खंदक दोन्ही सापडले.
संस्कृतीचे उत्खनन अवशेष=
जोर्वे=
याठिकाणी ब्राँझ च्या सहा कुऱ्हाडी आणि एक तांब्याची बांगडी सापडली. कुऱ्हाडी ची लांबी 66 मि मी , तर रुंदी 56 मी मी इतकी होती. यातील तांब्याचे प्रमाण हे 97% तर बाकी कथील धातु होते.
इनामगाव=
याठिकाणी द्विस्तरीय घरांचे अवशेष ,कास्याच्या मूर्ती ,रंगीत खापरे इत्यादी गोष्टी सा पडल्यात.
दायमाबाद=
चार संस्कृतींचे माहेरघर असणाऱ्या दायमाबाद मध्ये कास्याच्या मूर्ती सापडल्या .त्यामध्ये कास्या चा रथ ,गेंडा, हत्ती चित्ता इत्यादी गोष्टी आहेत. त्याच बरोबर तत्कालीन एक विहीरही सापडली आहे.
सत्ता=
कोणत्याही राजसत्तेचा येथे पुरावा सापडत नाही. पण गावाचा मुख्य व्यक्ती हा सर्व कारभार बघत असेल असा अंदाज आहे. दायमाबाद येथे सापडलेल्या मातृ मूर्तीमुळे हे लोक देखील मातृ सत्ता मानणारे होते हे लक्षात येते...
शेती==
आपल्याला पुरावा पाहून आश्चर्य वाटते की चार हजार वर्षांपूर्वी महाराष्ट्रात खरीप आणि रब्बी पिके घ्यायला सुरुवात झाली. विविध धान्य ,डाळी, कडधान्य ,तेलबिया यांचा समावेश यात होता. गहू, जव ,तांदूळ ,नाचणी, ज्वारी ,बाजरी ,राळ ,मसूर इत्यादी पिके ही माणसे घेत होती.
गव्हाला जास्त पाणी लागते म्हणून इनाम गावच्या लोकांनी पुराचे पाणी जमिनीला भेटण्यासाठी पाट काढले होते..
शेतीसाठीची अवजार हीदेखील उत्खननात मिळाली ..यात हरणाच्या शिंगापासून बनविलेले नांगर ,बैलाच्या हाडापासून बनविलेले नांगराचे काम करणारे पाते ,हरणाचे शिंग पोकळ करून त्यातून पेरणी करताना बिया सोडण्यासाठी केलेले सीड ड्रील यांचा समावेश आहे ..अशाप्रकारे ही संस्कृती महाराष्ट्रात होती. विषय फार कठीण आणि सखोल आहे.. पण मी कमीत कमी शब्दात जोर्वे संस्कृती तुमच्यापर्यंत पोहोचविण्याचे काम केले. सध्या माझे काम यावरच चालू आहे म्हणून सहज स्थळदर्शन करण्यासाठी जोर्वे ला गेलो.तिथे एक प्राचीन दत्तमंदिर आहे .आणि अशी आख्यायिका आहे किती दत्तमूर्ती नदीत सापडली .आणि संशयाची पाल माझ्या मनाला चाटून गेली. सहज विचार आला की ही मूर्ती ताम्रपाषाण युगातील तर नसेल .तेथील पुजाऱ्यांना विनंती केली आणि मूर्तीचे निरीक्षण केले. जरा अभ्यास केला आणि आश्चर्य झालं .भारताच्या दत्तसंप्रदायातील प्रमुख असलेल्या दासोपंत संप्रदायातील ती मूर्ती आहे .आणि दासोपंतांचे शिष्य परमहंस संत ज्ञानेश्वर महाराज यांना ती सापडली .विशेष म्हणजे अशा प्रकारच्या फक्त दोनच मूर्ती या भारतात आहे .एक आंबेजोगाई जवळील माळवे येथे आणि दुसरी संगमनेरात. खरोखरच इतिहास कोठून कसा घेऊन जातो समजतच नाही 😊😊
संदर्भ =
1)Excavation at nashik and jorwa- dr.h.d .sankliya and dr.s.b.deo
2)notification of centrally protected monumer in India
3)first farmer of deccan= madhukar dhavalikar
तुमचाच
श्री प्रसाद चंद्रशेखर कानडे
8378880936

thepostman.co.in
नगरच्या या नदीकाठी अश्मयुगीन मानव राहत असल्याचे पुरावे सापडलेत
6–8 minutes
आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक, युट्युब

मनुष्याच्या जीवनातील प्रत्येक गोष्ट ही इतिहासाशी निगडीत असते. मात्र हे पण हे लक्षात घ्यायला हवे की इतिहास म्हणजे काही नुसत्या सनावळ्या आणि लढायांची जंत्री नाही. या इतिहासाला देखील एक इतिहास होता, तो म्हणजे मानवी संस्कृतीच्या विकासाचा. मानवी वस्त्यांचे अवशेष आपल्याला संपूर्ण मानव जातीचा इतिहास आणि संस्कृती सांगत असतो.

आपल्याला आजकालच्या शाळेमध्ये विशेषतः इयत्ता ३ री च्या पुस्तकामध्ये अश्मयुगीन माणसाची माहिती दिलेली आढळते. मुले अभ्यासामध्ये अश्मयुग, नवअश्मयुग, ताम्रपाषाणयुग वगैरे शब्द पाठ करतात दगडाच्या कुऱ्हाडीची, रापींची, चित्रे पुस्तकात पाहतात. परंतु पुस्तकातील दगडी ह*त्यारांची केवळ चित्रे न बघता प्रत्यक्ष दगडी कुऱ्हाड जर पाहिली तर त्या शाळेतील मुलांना प्राचीन मानवी इतिहासाबद्दल माहिती समजायला फक्त मदतच होत नाही तर त्याबद्दल जिज्ञासा देखील निर्माण होते. तसेच जर या विद्यार्थ्यांना एखाद्या कोरड्या नदीच्या पात्रात अभ्यासाला नेले तर या विद्यार्थ्यांना देखील प्राचीन मानवी वसाहतीचे पुरावे पाहायला मिळतील आणि प्राचीन मानवाच्या वस्तीची स्थाने कशी पाहतात हे कसे ओळखायचे याबाबत नक्की माहिती मिळेल.

अशाच प्राचीन मानवाच्या नदीपात्रातील वस्तींची माहिती घ्यायची असेल तर महाराष्ट्रातील नद्यांचे महत्त्व किती आहे याबाबत जाणून घेणे फार महत्वाचे ठरेल.


प्राचीन मानवी संस्कृतीच्या खुणा दर्शवणारा माठ यावरील प्राचीन मानवाने केले रंगकाम दिसून येते.
महाराष्ट्राची भौगोलिक रचना जर पहिली तर तिचे मानवाच्या संस्कृतीच्या विकासामध्ये योगदान आपल्याला दिसून येते. मानवी शरीरात जशा धमन्या रक्त पुरविण्याचे काम करतात त्याच प्रकारे महाराष्ट्रातील नद्या महाराष्ट्राचे पोषण करतात. महाराष्ट्रातील नद्यांचे योगदान मानवाच्या विकासासाठी फार मोठे कारण आहे.

याच नद्यांच्या काठावर मानवी संस्कृती स्थिर झाली आणि याच महाराष्ट्रातील नद्यांच्या काठाला लहान मोठी नगरे उभी राहिली. ऋग्वेदामध्ये सिंधू, सरस्वती यांसारख्या नद्यांना देवता मानून त्यांचे स्तवन केलेले आपल्याला आढळते.

मानवी संस्कृतीचा अभ्यास करायचा असेल तर या नद्यांचा देखील अभ्यास करणे फार महत्त्वाचे ठरते तसेच त्या नदीकाठी वसलेल्या किंवा विकसित झालेल्या वसाहतींचा अभ्यास करणे हे देखील महत्त्वाचे असते.

आजपर्यंत मानवी संस्कृतीचा अभ्यास करताना बरीचशी ठिकाणे ही पुरातत्वीय अभ्यासकांना महाराष्ट्रातील विविध ठिकाणी सापडली आहेत त्यातील बहुतांश ठिकाणे नदीकाठी सापडलेली आहेत. भारतामधील नदीच्या काठी वसलेल्या संस्कृतीची उत्तम उदाहरणे म्हणजे प्राचीन सरस्वती नदीकाठी वसलेले कालीबंगन येथे ‘घग्गर’ संस्कृतीचे अवशेष सापडलेले आपल्याला बघायला मिळतात.

आपल्या महाराष्ट्रामध्ये शिरूरजवळ असणाऱ्या ‘इनामगाव’ येथील घोडनदीच्या काठावर झालेल्या उत्खननात ‘माळवा संस्कृती’, ‘पुर्वजोर्वे संस्कृती’ अशा ताम्रपाषाणयुगीन संस्कृतीमधील विविध स्तर उत्खननात सापडले. महाराष्ट्रातील प्रवरा ही एक अत्यंत महत्त्वाची नदी. याच प्रवरा नदीच्या खोऱ्यामध्ये नेवासा, दायमाबाद तसेच जोर्वे येथे अश्मयुगीन आणि ताम्रपाषाणयुगीन वसाहतीचे पुरावे उत्खननातून मिळाले. हे उत्खनन प्राचीन मानवी वसाहती महाराष्ट्रात होत्या याचे फार मोठे पुरावे उपलब्ध करून देते.


प्राचीन मानवाचा पुनर्जन्मावर फार विश्वास होता हे वरील दोन माठांच्यावरून दिसून येते या वरील माठांमध्ये मृत झालेल्या व्यक्तींचे शरीर ठेवून पुरत असत.
प्रवरा नदी नगर जिल्ह्याची जीवनदायिनी. अनेक छोटीमोठी गावे या प्रवरा नदीच्या काठावर वसलेली आहेत. मुळात नगर जिल्ह्याचे वैशिष्ट्य असे आहे की गोदावरीच्या खोऱ्यामधील प्रवरा नदी आणि कृष्णा खोऱ्यामध्ये असणारी सीना नदी या दोन्ही नद्या या एकाच जिल्ह्यातून वाहतात.

या नद्यांच्या काठी मानवी संस्कृती वसत गेली आणि मानवाचा विकास होत गेला हे आपल्याला या नद्यांच्या काठावर आढळणाऱ्या मानवी वसाहतींच्या अवशेषांवरून समजते. प्रागैतिहासिक काळापासून या संपूर्ण खोऱ्यामध्ये विविध संस्कृती नांदल्या आणि विविध मानवी संस्कृती या महाराष्ट्रात उदयाला आल्या असे आपल्याला दिसते.

अश्मयुगात माणूस भटक्या अवस्थेत होता. त्या काळामध्ये माणूस पाण्याच्या आश्रयाने राहत असे आणि आपल्या आजूबाजूला उपलब्ध असलेल्या दगडांची तो ह*त्यारे करीत असे, जुनी झालेली ह*त्यारे तेथेच टाकून तो स्थलांतर करत असे. या टाकलेल्या ह*त्यारांवर पावसाळ्यात नदी आपला गाळ जो वाहून आणते त्याचा थर या ह*त्यारांवर बसायला लागला की ही ह*त्यारे नदीपात्रातील मातीमध्ये बुजून जातात. जसजसा नदीचा गाळ कालांतराने वाहून जातो किंवा नदीपात्र हे शुष्क बनते तसे हे लपले गेलेले ह*त्यारे आणि प्राचीन मानवी वसाहतीच्या जागा दिसू लागतात.

प्राचीन मानवी वसाहतीच्या जागा या बऱ्याचश्या गावांमध्ये ‘पांढरी किंवा पांढर’ या नावाने प्रसिद्ध असतात. या पांढरी बऱ्याचदा नदीपात्रालगत असतात आणि या पांढरीचा थर मात्र नेहमीच्या मातीपेक्षा खूप वेगळा असतो. या पांढरीच्या टेकडामुळे बऱ्याचदा आपल्याला प्राचीन मानवी संस्कृतीचे धागेदोरे सापडायला मदत होते.


प्राचीन माणसाने तयार केलेल्या भांड्याच्या विविध वस्तू.
प्राचीन मानवी संस्कृतीचे धागे दोरे सापडण्यात जशी प्राचीन मानवी ह*त्यारे मदत करतात तसेच मातीची खापरे देखील फार महत्वाची ठरतात. इतर धातूची भांडी ही कालौघात नष्ट होतात परंतु मातीची भांडी आणि त्यांची खापरे वर्षानुवर्षे तशीच राहतात. म्हणून या मातीच्या खापरांना आत्यंतिक महत्त्व आहे.

या मातीच्या खापारांवरून आपल्याला प्राचीन मानवी वसाहतींचा काळ निश्चित करता येतो.

या विविध मानवी संस्कृती या महाराष्ट्रातील नदीकाठी नांदत होत्या, त्याचे पुरावे या महाराष्ट्रातल्या नद्या आपल्याला देतात आणि मानवी संस्कृतीच्या विकासाच्या पाऊलखुणा या आपल्याला धुंडाळणे फार महत्त्वाचे ठरते, कारण यातून आपल्याला प्रागैतिहासिक मानवाची प्रगती समजते आणि नदीकाठच्या प्राचीन संस्कृतीतून आजच्या मानवाच्या प्रगतीची झलक दिसून येते.


महाराष्ट्रात ज्या मोठ्या प्राचीन संस्कृती आढळल्या आहेत त्यांची नावे.   (नकाशा आंतरजालावरून घेतला आहे.)
सदर लेख महाराष्ट्राची शोधयात्रा वर  पूर्वप्रकाशित.

संदर्भपुस्तके:-

पुरातत्वविद्या:- श्री. शां.भा.देव,१९७९
महाराष्ट्रातील पुरातत्व:- श्री. ह.ध. सांकलिया आणि म.श्री. माटे महाराष्ट्र राज्य सांस्कृतिक मंडळ, १९७६
छायाचित्रे:-

महाराष्ट्रातील प्रागैतिहासिक मानवाच्या वस्तीची स्थळे.
डेक्कन कॉलेज फिल्ड व्हीजीट दरम्यान घेतलेली छायचित्र आहेत.

itihasmaala.blogspot.com
इयत्ता ११ वी - (इतिहास) - प्रकरण ३
Prof.Alka Sangamnere
14–17 minutes
इयत्ता ११ वी - (इतिहास) - प्रकरण ३

विषय - इतिहास         

प्रकरण-३ रे   

 भारतातील ताम्रपाषाणयुगीन गाव - वसाहती 


भारतात  ज्या कालखंडातील  हत्यारे व  उपकरणांसाठी पाषाणाबरोबरच प्रथम तांब्याचा

उपयोग होऊ लागला, या कालखंडाला ‘ताम्रपाषाणयुग’ असे म्हटले जाते.

या कालखंडात तांबे वितळवण्याचे तंत्र भारतातील मानवाने  चांगलेच आत्मसात केलेले होते.

या कालखंडात तांब्याच्या कुऱ्हाडी, छिन्न्या आणि अनेक प्रकारचे छोटी शस्त्र तयार झालेले आहेत. 

याशिवाय तांब्याचे अनेक उपकरणे आणि अलंकारही उत्खननात सापडले आहेत. 

या कालखंडात तांब्याची व मातीची भांडी आढळतात. 

ताम्रपाषाणयुगीन संस्कृती म्हणजे तांबे आणि दगड या दोहोंची हत्यारे वापरणार्‍या लोकांची संस्कृती होय.

 नैसर्गिक आपत्तीमुळे हडप्पा संस्कृती काळातील लोकांना स्थलांतर करावे लागले. ते लोक जेथे नव्याने वसले, तेथे गाव-वसाहती या स्वरुपात नवीन संस्कृती उदयाला आल्या.

या नवीन संस्कृतीचा प्रसार भारतात राजस्थान, गुजरात,बिहार,बंगाल,ओरिसा, मध्यप्रदेश, महाराष्ट्र आणि गंगेचे खोरे या प्रदेशात झाला.या संस्कृतीना ताम्रपाषाणयुगीन संस्कृती  म्हणतात. 

उत्तर हडप्पा संस्कृती काळातील स्थलांतरित लोक जेथे जेथे पोहोचले तेथे स्थानिक संस्कृतीमध्ये ते मिसळून गेले. 

या ठिकाणी भांडी घडवणे, तांब्याच्या वस्तू बनवणे, शेती करणे या गोष्टींचे स्थानिक लोकांना ज्ञान दिले. 

त्यातून  प्रादेशिकतेनुसार वैशिष्ट्यांचे वैविध्य दर्शविणाऱ्या वसाहतींच्या स्वरूपातील नवीन संस्कृती उदयाला आल्या.

 ग्राम-वसाहतीच्या रचनेत नागरी हडप्पा काळातील शिस्त दिसत  नाही. 

हडप्पा येथील ‘एच’ या दफनस्थळातील मिळालेल्या अस्थीकुंभावरील नक्षीचे नमुने हे वेगळ्या प्रकारचे आहेत.

त्यामध्ये चंद्र,सूर्य,मासे, हरीण आणि मोर या प्रतीकांचा वापर केलेला दिसतो.

  अस्थीकुंभावरील मोराच्या पोटात मृताचे शरीर दाखवलेले आहे.

उत्तर हडप्पा संस्कृतीचे लोक आर्य होते,असे काही पुरातत्वज्ञाचे मत आहे,पण हे लोक निश्चित कोण होते, हे ठरविण्यासाठी अधिक संशोधनाची गरज आहे.

राजस्थान --

 ‘आहाड’ किंवा ‘बनास’ संस्कृती--(टीप लिहा.)

राजस्थानमधील मेवाड प्रदेशातील ही संस्कृती हडप्पा संस्कृतीची समकालीन संस्कृती आहे.

 तिचा कालखंड इ.स.पू. ४०००  इतका प्राचीन आहे.

  उदयपूर जवळच्या आहाड येथे सर्वप्रथम तिचा शोध लागला, म्हणून तिला आहाड  संस्कृती असे म्हणतात. 

आहाड  संस्कृतीला ‘बनास संस्कृती’ असेही म्हणतात; कारण ही संस्कृती बनास नदीच्या उपनदीवर वसलेली आहे.

 बालाथल आणि गिलुंड ही या  संस्कृतीची महत्त्वाची स्थळे आहेत. 

 बालाथल येथे मोठ्या प्रमाणावर मातीच्या भांड्यांचे  उत्पादन होत होते.

त्याचा पुरवठा आहाड संस्कृतीच्या इतर गाव- वसाहतींना केला जात होता.

आहाड संस्कृतीच्या मातीच्या भांड्यांमध्ये काळी आणि तांबडी भांडी महत्वाची आहेत.ती चाकावर घडवलेली असत.त्यांचा आतील भाग आणि तोंडाजवळचा भाग  काळा आणि उरलेला भाग तांबडा असे. 

 मातीच्या भांड्याबरोबरच मातीचे बैल, शंखांच्या वस्तू, दगडी पाती, छिन्न्या, बाणाची अग्रे, तांब्याची हत्यारे यासारख्या वस्तू  मोठ्या प्रमाणात मिळाल्या.

 बालाथल  येथील घरे पक्क्या विटांची (इंग्लिश बॉण्ड पद्धत) बांधली होती.

बालाथलभोवती तटबंदी होती. हडप्पा संस्कृतीशी  असलेल्या संबंधाचा पुरावा आहे.

हडप्पा संस्कृतीचे लोक आहाड संस्कृतीच्या लोकांकडूनच तांबे आणि तांब्याच्या वस्तू आयात करत असावेत,असे दिसते.

तांबे वितळवून ते शुद्ध करण्याचे ज्ञान त्यांच्याकडे होते.

राजस्थानातील खेत्री येथील तांब्याच्या खाणींमधून हे लोक तांबे मिळवत होते.

गणेश्वर-जोधपुरा संस्कृती-

गणेश्वर-जोधपुरा  संस्कृतीच्या नावाने ओळखल्या जाणाऱ्या संस्कृतीची अनेक  स्थळे राजस्थानातील  खेत्री परिसरात सापडले आहेत. 

या गाव-वसाहती  हडप्पापूर्व काळातील  होत्या. 

गणेश्वर येथील उत्खननामध्ये तांब्याचे  बाण आणि भाले यांचे अग्रे,  मासेमारीचे गळ,बांगड्या, छिन्न्या यासारख्या वस्तू आणि आणि मातीची भांडी मिळाले.

गणेश्वर-जोधपुरा संस्कृतीचे लोक हडप्पा संस्कृतीच्या लोकांना तांब्याच्या वस्तू पुरवत असत.

गंगेचे खोरे- 

गेरू रंगाची भांडी आणि ताम्रनिधी-

  गेरू रंगाच्या भांड्यांची खापरे नदीच्या पात्रात सापडतात. सहसा पाण्याच्या प्रवाहामुळे ती झिजलेली आणि ठिसूळ झालेल्या अवस्थेत सापडतात.

 या संस्कृतीची स्थळे पंजाब, हरियाणा, राजस्थान आणि उत्तर प्रदेशचा पश्चिमेकडील भाग एवढ्या विस्तीर्ण प्रदेशात सापडतात.

  राजस्थान-

गेरू रंगाची भांडी वापरणाऱ्या लोकांच्या संस्कृतीचा राजस्थानातील काळ इ.स.पू. 3000  वर्षे इतका प्राचीन आहे.

 गंगा-यमुना या नद्यांच्या दुआबात इ.स.पू. 2000 च्या सुमारास नांदत होती. 

 या काळातील लोक स्थिर  गाव-वसाहतीमध्ये राहत होते. त्यांची घरे, घरातील जमिनी  चोपून तयार केलेल्या आहेत.

 त्या घरांच्या आतमध्ये चूली, मातीच्या पक्क्या  भाजलेल्या पुरुषरुपी बाहुल्या, बैल गाईगुरांची हाडे, तांदूळ ,सातू यासारख्या वस्तू सापडल्या.

 यावरून या संस्कृतीचे लोक  स्थिर गाव- वसाहतींमधून राहत होते आणि ते शेती करत होते, हे स्पष्ट होते. 

 भारतातील ताम्रनिधी प्रामुख्याने उत्तर प्रदेश, बंगाल, बिहार, ओडिसा आणि मध्य प्रदेश येथे मिळाले आहेत.

 ताम्रनिधीमधील वस्तूंचे स्वरूप पाहता त्या घडवणारे कारागीर तांब्याच्या वस्तू घडवण्यात निष्णात होते, हे स्पष्ट आहे.

  गेरू रंगाची भांडी वापरणाऱ्या लोकांची संस्कृती आणि ताम्रनिधी हे काही ठिकाणी जवळच्या परिसरात सापडतात. 

त्यामुळे ताम्रनिधीतील वस्तू घडवणारे कारागीर गेरू रंगाच्या भांड्याच्या संस्कृतीचे होते, असे मानले जाते.

ही संस्कृती उत्तर हडप्पा संस्कृती काळातील स्थलांतरित लोकांची आहे, असे काही पुरातत्वज्ञांचे मत होते.

तर काही पुरातत्त्वज्ञ गंगा-यमुना नद्यांच्या दुआबात सापडलेल्या ताम्रनिधींचा संबंध वैदिक आर्यांशी  जोडतात.

 या संस्कृतीचे मूलभूत लक्षण असलेली गेरू रंगाची भांडी आणि ताम्रनिधी यांच्यामध्ये असलेल्या सान्निध्यामुळे ती एक स्वतंत्र संस्कृती असावी, असाही एक मतप्रवाह आहे.

बंगाल, बिहार, ओडिसा-

 प्रश्न- हडप्पा संस्कृतीचे लोक बिहारपर्यंत पोहोचले होते. ( तुमचे मत नोंदवा)

बंगाल, बिहार, ओरिसा आणि मध्य प्रदेशामध्ये ताम्रनिधी मिळाले असले तरी गेरू रंगाची भांडी या प्रदेशांमध्ये मिळत नाहीत.

 या राज्यांमध्ये ताम्रपाषाणयुगीन संस्कृतींची स्थळे उजेडात आली आहेत.

 बिहारमधील चिरांड, सोनपूर येथील उत्खननात काळी आणि तांबडी मातीची भांडी मिळाली.

 या भांड्यांचे घाट (बनावट) हडप्पा संस्कृतीतील  भांड्यांच्या  घाटांसारखे आहेत.

           हडप्पा संस्कृतीच्या उतरणीच्या काळात या लोकांनी बंगाल, बिहार,ओडिसा या प्रदेशात स्थलांतर केले.

 ताम्रपाषाण संस्कृतीचे मूलभूत लक्षण म्हणजे गेरू रंगाची भांडी आणि ताम्रनिधी होय.

शिवाय बंगाल आणि ओडिसातील ताम्रपाषाणयुगीन स्थळांमधील  मातीच्या भांड्यांवर हडप्पा संस्कृतीचा प्रभाव आहे. 

त्यामध्ये वाडगे, कुंडे यांची घडणही हडप्पा संस्कृतीशी साम्य दर्शवणारी आहे.

यावरून असे अनुमान काढले जाते की, हडप्पा संस्कृतीचे लोक बिहारपर्यंत पोहोचले होते. 

मध्य प्रदेश : कायथा संस्कृती -

मध्य प्रदेशातील कायथा जि.उज्जैन येथे या संस्कृतीचे अवशेष सर्वप्रथम सापडले, म्हणून तिला कायथा संस्कृती म्हणतात.

  कायथा संस्कृती  नागरी हडप्पा संस्कृतीची समकालीन  होती. याचा शोध प्रसिद्ध पुरातत्त्वज्ञ डॉ. वाकणकर यांनी लावला.

  कायथा  संस्कृतीच्या लोकांचे जीवन शेती आणि पशुपालनावर अवलंबून होते. 

हे लोक प्रामुख्याने हाताने बनवलेली मातीची भांडी, गारगोटीच्या दगडांपासून बनवलेली सुक्ष्मास्त्रे वापरत होते.

  याशिवाय कायथा येथील घरांमध्ये तांब्याच्या कुऱ्हाडी आणि बांगड्या, मौल्यवान खड्यांचे मणी असलेले हार सापडले.

 याशिवाय संगजिरा (steatite) या दगडाच्या भुकटीपासून बनवलेले चकतीच्या आकाराचे छोटे  मणी सापडले.

 यावरून कायथा आणि हडप्पा संस्कृती यांच्यातील परस्परसंबंध हडप्पा नगरांच्या उदयाच्याही आधीच्या काळापासून असावा,असे दिसते.

 कायथा संस्कृतीनंतर राजस्थानातील आहाड संस्कृतीचे लोक मध्यप्रदेशात आले. काही काळ या दोन्ही संस्कृती मध्यप्रदेशात एकत्र  नांदल्या असण्याचीही शक्यता आहे.

 त्यानंतरच्या काळात माळवा संस्कृतीचे अवशेष मिळतात.


माळवा संस्कृती- (टिप लिहा)

माळवा संस्कृतीचा उगम आणि विस्तार प्रथम माळव्यात झाला.

 या संस्कृतीचा कालखंड इ.स.पूर्व १८०० ते १२००  इतका आहे.

 नर्मदा नदीतीरावरील नावडाटोली हे या संस्कृतीचे महत्त्व जास्त आहे. 

  याशिवाय मध्यप्रदेशातील  सागर जिल्ह्यातील एरण, उज्जैन जिल्ह्यातील नागदा ही  सुद्धा महत्वाची स्थळे आहेत.

 नागदा आणि  एरण येथील माळवा संस्कृतीच्या  गाव-वसाहती तटबंदीयुक्त होत्या.

 या लोकांची घरे आयताकृती आणि  ऐसपैस असत.


गुजरात -

प्रश्न- गुजरातमधील ताम्रपाषाणयुगीन संस्कृतीचे माहिती दिलेल्या मुद्द्यांच्या आधारे लिहा.  मुद्दे-१.  कालखंड   २.  व्यवसाय   ३.  विस्तार       ४. इतर संस्कृतींची  आलेल्या संबंधाचा पुरावा.

गुजरातमधील ताम्रपाषाणयुगीन गाव-वसाहतींचा काळ हडप्पा संस्कृतीचे समकालीन आहे. त्यामध्ये -

    कालखंड--

१.  पूर्व हडप्पा इसवी सन पूर्व ३९५० -२६०० 

२.   नागरी हडप्पा इ.स.पू.२६०० -१९०० 

३.    हडप्पा संस्कृतीच्या नाशानंतर हडप्पोत्तर काळ.

        या हडप्पा संस्कृतीच्या तिनही  काळाशी मिळताजुळता आहे.

     व्यवसाय -

 गुजरातमधील ताम्रपाषाणयुगीन वसाहतींच्या  मातीच्या भांड्यांमध्ये कच्छ-सौराष्ट्र, उत्तर गुजरात असे प्रादेशिक वैविध्य आढळते.

गुजरातमध्ये गारगोटीच्या खड्यांपासून रंगी-बेरंगी मणी  बनवणे, हा हडप्पा  संस्कृतीमधील एक मोठा उद्योग होता.

 गाव वसाहतींमधून  मण्यांसाठी कच्चा माल मिळवणे. मातीची  नक्षीदार भांडी बनवणे.

 शेतीतून अन्नधान्य पिकवणे.

यासारखे व्यवसाय ताम्रपाषाणयुगीन संस्कृतीच्या काळात गुजरातमध्ये अस्तित्वात असावे, असे दिसते.

 विस्तार -

गुजरातमधील या ताम्रपाषाणयुगीन संस्कृतीचा विस्तार कच्छ-सौराष्ट्र, उत्तर गुजरात अशा विस्तीर्ण प्रदेशात झालेला होता. 

 इतर संस्कृतींशी आलेल्या संबंधाचा पुरावा -

या संस्कृतीचा संबंध दक्षिण सौराष्ट्रातील ‘प्रभाव संस्कृती’ आणि ईशान्य सौराष्ट्रातील ‘रंगपुर संस्कृती’ यांच्याशी होता.

उत्तर हडप्पा काळात दक्षिण सौराष्ट्रात प्रभास जि. जुनागड येथे प्रभास संस्कृती, तर      ईशान्य सौराष्ट्र रंगपूर जि. लिम्बडी येथे रंगपुर संस्कृती उदयाला आली.

या दोन ताम्रपाषाणयुगीन संस्कृतीमधील मातीच्या भांड्यांचे रंग, नक्षी, घाट याबाबतीत साम्य होते. 

 या संस्कृती इसवी सनापूर्वी १८०० - १२०० या काळात अस्तित्वात होत्या. 

  ताम्रपाषाणयुगीन महाराष्ट्र -              

महाराष्ट्रामध्ये उत्तर हडप्पा संस्कृतीचे लोक पोहोचले होते, याचा पुरावा दायमाबाद येथे मिळाला आहे. 

हडप्पा संस्कृतीचे लोक तिथे पोहोचण्याआधीच्या काळात तिथे जी ताम्रपाषाणयुगीन संस्कृती  होती, तिला सावळदा संस्कृती म्हणतात.

 त्यानंतरच्या काळात तेथे अनुक्रमे माळवा संस्कृती आणि जोर्वे संस्कृतीचे अवशेष मिळालेले आहेत.

सावळदा संस्कृती -

धुळे जिल्ह्यात तापी नदीच्या काठी हे स्थळ आहे.

 सावळदा संस्कृतीचा काळ इसवी सनापूर्वी सुमारे २००० -१८००  असा होता.

 या संस्कृतीचा उगम उत्तर महाराष्ट्रातील मध्याश्मयुगीन लोकांचा सौराष्ट्रातील हडप्पा संस्कृतीच्या  लोकांशी  आलेल्या संपर्कातून झाला असावा.

कारण धुळे जिल्ह्यातील कावठे या स्थळाच्या  उत्खननात सापडलेल्या  शंखांच्या वस्तू महाराष्ट्रातील हडप्पा संस्कृतीच्या लोकांची असलेल्या विनिमयाचा पुरावा आहे.

दायमाबाद येथील या संस्कृतीचे लोक चाकावर घडवलेली मातीची भांडी वापरत होते.

त्या भांड्यांवरील  नक्षीमध्ये  तीराग्रे ,माशांचे गळ, विविध प्राणी यांच्या आकृतींचा समावेश होता. 

याशिवाय तांब्याच्या वस्तू, हाडांपासून  बनवलेली तिराग्रे,खड्यांचे  मणी ,दगडी पाटे-वरवंटे इत्यादी वस्तू त्यांच्या वापरात होत्या.

 त्यांच्या  गाव-वसाहतींभोवती तटबंदी बांधलेली होती. त्यांची घरे मातीची असून, घरातील  जमिनी गाळ आणि माती एकत्र  चोपून  बनवलेल्या होत्या.

 माळवा आणि जोर्वे संस्कृती :  महाराष्ट्राचे आद्य शेतकरी -

प्रश्न- माळवा संस्कृतीच्या लोकांना ‘महाराष्ट्राचे आद्य शेतकरी’ म्हटले जाते. (सकारण स्पष्ट करा.)

महाराष्ट्रातील आद्य शेतकऱ्यांच्या गाव-वसाहती ताम्रपाषाणयुगीन होत्या.

इसवी सनापूर्वी १६०० च्या  माळवा संस्कृतीचे लोक महाराष्ट्रात पोहोचले.

माळवा संस्कृतीच्या लोकांनी महाराष्ट्रामध्ये प्रथम शेतकऱ्यांच्या कायमस्वरूपी गाव वसाहती वसविल्या.

 हे शेतकरी शेतीत गहू, बार्ली, ज्वारी अशी पिके घेऊ लागले. 

त्यामुळे माळवा संस्कृतीच्या लोकांना महाराष्ट्राचे आद्य शेतकरी म्हटले जाते.

          महाराष्ट्रात आल्यावर त्यांचा संपर्क कर्नाटकातील नवाश्मयुगीन संस्कृतीच्या लोकांशी

          आला    .  

त्यामुळे सावळदा संस्कृतीचे लोक घडवत असलेल्या मातीच्या भांड्यांचे तंत्रज्ञान, घाट नक्षीचे नमुने यामध्ये काही बदल घडून आले आणि जोर्वे संस्कृती या नावाने ओळखली जाणारी नवीन संस्कृती उदयास आली.

अहमदनगर जिल्ह्यातील जोर्वे येथे हे संस्कृती प्रथम उजेडात आली. म्हणून तिला जोर्वे संस्कृती असे म्हणतात.

महाराष्ट्रात ताम्रपाषाणयुगीन संस्कृतीचा विस्तार तापी, गोदावरी आणि  भीमा या नद्यांच्या खोऱ्यात झाला होता.

इनामगाव,ता.शिरूर, जि. पुणे. येथील विस्तृत उत्खननामुळे माळवा आणि जोर्वे संस्कृतीमधील लोकांच्या जीवनाबद्दल सविस्तर माहिती उपलब्ध झालेली आहे.  

१. माळवा संस्कृती--- इ.स.पू.१६०० -१४०० 

२.  पूर्व जोर्वे संस्कृती-- इ.स.पू.१४०० -१००० 

३.  उत्तर जोर्वे संस्कृती-- इ.स.पू.१००० -७०० 

  उत्खनित  स्थळे-

   दायमाबाद,प्रकाशे, जिल्हा नंदुरबार, चांडोली, सोनगाव, इनामगाव, वाळकी  जिल्हा पुणे,  नेवासे जिल्हा अहमदनगर, पिंपळदर जिल्हा नासिक,

माळवा संस्कृती ( इ.स.पू.१६००-१४०० ) 

    या काळातील लोकांची घरे--

लोकांची घरे आयताकृती आणि ऐसपैस  होती. घराच्या भिंती कुडाच्या असत. 

घरामध्ये आडभिंत घालून घराचे दोन भाग केलेले असत. 

जमिनीतून गोल  खड्डा करून झोपड्या( गर्तावास )  उभारल्या जात.

  धान्य साठवण व्यवस्था--

कोठी ठेवण्यासाठी एक गोल ओटा,चार पायांचे रांजण ठेवण्यासाठी टेकूचे चार चपटे दगड आणि चून्याने लिंपलेले बळद  यासारख्या गोष्टीवरून घरामध्ये दीर्घकालीन साठवणूक करण्यासाठी केलेली तरतूद लक्षात येते.

मातीची भांडी-  

मातीची भांडी पिवळसर  रंगाची असत. त्यावर तपकिरी रंगात नक्षी काढलेली असे.  त्यांचा पोत खरबरीत असतो. 


पूर्व जोर्वे संस्कृती ( इ.स.पू.१४००-१०००)

 या काळातील लोकांची घरे-

घरे चौकोणी, प्रशस्त, एकापेक्षा अधिक खोल्यांचे होते. गोल खड्डा करून त्यावर  उघडलेल्या झोपड्यांची (गर्तावास) संख्या नगण्य होती.

 गाव प्रमुखाचे मध्यवर्ती जागेत पाच खोल्यांचे घर होते.

मातीची भांडी--

 त्या काळातील भांडी खणखणीत भाजलेली असल्यामुळे  त्यांचा नाद धातूच्या  भांड्याप्रमाणे असतो. 

त्यांचा रंग लाल असतो आणि काळ्या  रंगाने नक्षी काढलेली असते. 

मध्यभागी कंगोरे असलेले वाडगे आणि कुंडे, चंबु, घडे अशा घाटाच्या  भांडयांचा समावेश होता.

 या काळातील कुंभकाराच्या भट्ट्या गोल आकाराच्या होत्या. त्यांची क्षमता  जास्त होते.

इनामगाव हे इतर गावांना मातीची भांडी पुरवणारे केंद्र होते.

पूर्व जोर्वे काळात इनामगावमध्ये नदीला कालवा काढून नदीचे पाणी साठवण्याची सोय केली होती. 

 सिंचनासाठी वापर होत असे. गाव प्रमुखाकडे पाणीवाटपाचे अधिकार होते. गाव प्रमुख पद वंशपरंपरागत होते. हे दर्शवणारी  दफणे प्रमुखाच्या घरालगत सर्वसाधारण  दफना पेक्षा  वेगळ्या पद्धतीची होती.

  धान्य साठवण व्यवस्था-घराच्या बाहेर बरीच बळदे होती.येथील शेतकरी गहू,बार्ली, ज्वारी, मसूर, कुळीथ यासारखी पिके घेत होते.

 दफनपद्धती- प्रमुखाची दफने  घरालगतच वेगळ्या पद्धतीची होती. 

साधारणत: जमिनीत खड्डा खणून मृत व्यक्तीला उताण्या अवस्थेत पुरले जाई. तर कधी मृत व्यक्तीला एका चार पायाच्या, फुगिर पोटाच्या  रांजणात बसलेल्या अवस्थेत पुरले जाई.

 दोन पद्धतीने दफन केले  जाई. मृत बालकाला पुरण्यासाठी कुंभाचा वापर  करत असत.

उत्तर जोर्वे  संस्कृती ( इ.स.पू.१००० -७०० )- 

या काळातील लोकांची घरे- या काळात हवा शुष्क होऊ लागली, त्यामुळे लोकांना फिरस्ते जीवन जगावे लागले. 

परिणामी घराऐवजी झोपड्यांची संख्या वाढली. त्या गर्तावासाहून  वेगळ्या होत्या.टोकाला बांधलेला जुडगा तळाकडे पसरून तंबूप्रमाणे शंक्वाकृती झोपड्या होत्या.

 मातीची भांडी- पूर्व जोर्वे संस्कृती काळासारखे भांड्यांचे घाट असले तरी त्यावर फारसे  नक्षीकाम नव्हते.

 कुंभाराचे आवे( भट्ट्या) जमिनीवरच  रचले जात.

भारतातील महापाषाण युग -

 प्रतिकूल हवामानामुळे उत्तर जोर्वे काळात म्हणजे इ.स.पु. ७०० च्या काळात इनामगाव पूर्णपणे उजाड झाले.

 तेथील लोक भटके जीवन जगू लागले. त्या आकाराने मोठ्या असलेल्या  शिळांचा उपयोग करून उभारलेली शिलावर्तुळे सापडतात. 

त्या वर्तुळात दफने  असत.

   या शिळा आकाराने मोठ्या असल्याने त्यांना महापाषण तर ही शिळावर्तुळे ज्या काळातील आहेत, त्यांना महापाषाणयंग म्हणतात.

 ही शिलावर्तुळे अस्थी पुरण्यासाठी स्मारक म्हणून वापरली जात. 

जगभर शीलावर्तुळे सापडतात, त्यांची परंपरा प्रागैतिहासिक काळापासून आजपर्यंत आहे.

प्राचीन  शिलावर्तुळे इसवीसन पूर्व १५००  ते इ.स.पू.५०० या काळातील आहे.

 महाराष्ट्रातील शिलावर्तुळे इसवीसन पूर्व १००० ते  इसवी सन पूर्व ४०० या काळातील आहेत.

 ती उभारणारे लोक दक्षिण भारतातून आले असावेत.  ती लोह युगातील आहे.

 महाराष्ट्रात विदर्भामध्ये नागपूर, चंद्रपूर आणि भंडारा जिल्ह्यात टाकळघाट,माहूरझरी,  खापा, नायकुड  अशा अनेक ठिकाणी उत्खनन केले.  

अनेक शिलावर्तुळे प्राचीन व्यापारी मार्गावर होती.

 या काळातील कारागिरांच्या स्थिर गाव-वसाहतीचे अवशेष क्वचित सापडतात.  

शीलावर्तुळाच्या दफनात घोड्याची हाडे व दागिने मिळाले.

 यावरून या काळात लोक वाहन आणि सामान लादण्यासाठी घोड्यांचा वापर करत असावेत. 


- समाप्त -


bolbhidu.com
असा होता महाराष्ट्रातील ४ हजार वर्षांपूर्वीचा शेतकरी
By टिम बोलभिडू
6–7 minutes
असा होता महाराष्ट्रातील ४ हजार वर्षांपूर्वीचा शेतकरी
महाराष्ट्रातील अहमदनगर जिल्ह्यातील दायमाबाद येथे गुराखी मुलांना काही जुन्या मुर्त्या सापडल्या आहेत. श्रीरामपूरच्या पोलिसांनी त्या ताब्यात घेतल्या आहेत. पुरातत्व शास्त्रज्ञानी जाऊन पाहिल्यावर त्यांच्या लक्षात आलं की हे सिंधू संस्कृतीला समकालीन अवशेष आहेत.
On Mar 9, 2020 Last updated Mar 27, 2021



महाराष्ट्राच्या काळी मातीने शेतकऱ्यांना भरपूर दिलंय. अजूनही आपल्याकडे कृषिप्रधान संस्कृतीचा पगडा आहे. इडापीडा टळू दे बळीराजाचं राज्य येऊ दे असं कायम म्हटल जातं. छत्रपतींनी आपलं स्वराज्य उभारलं ते शेतकरी रयतेला सोबत घेऊनच. शेतकऱ्यांच्या भल्यासाठी त्यांनी लिहिलेली आज्ञापत्रे मार्गदर्शक ठरतात.

आजही इथलं राजकारण देखील शेतकऱ्यांच्या सहकाराभोवती फिरत असते. एकूण काय महाराष्ट्र शेतकऱ्यांनी आपल्या घामाने उभा केलाय.

पण तुम्हाला ठाऊक आहे का महाराष्ट्रातल्या शेतीला साडे-चार हजार वर्षाचा इतिहास आहे.

अश्मयुगीन मानव गुहेत राहायचा. शिकार करणे आणि कंदमूळ खाणे अस त्याच जीवन असायचं. या ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी अन्नपाण्याच्या शोधात भटकंती चालू असायची. कुऱ्हाडीसारख्या हत्याराचा वापर व्हायचा. काही काळाने त्याला जमिनीत पेरल की उगवत याचा शोध लागला. हा शोध क्रांतिकारी होता. त्यातूनच शेतीची कल्पना पुढे आली.

अस म्हणतात की, मानवाला शेतीचा शोध लागला आणि त्याच भटक आयुष्य स्थिर झाल. नदीच्या आसपास एकेठिकाणी वस्ती करून राहणे भाग पडले. जगभरात अशा नदीच्या शेजारच्या संस्कृती सापडल्या. यात सर्वात महत्वाची मानली जाते ती सिंधू संस्कृती.

हडप्पा मोहोन्जोदारो मध्ये आढळून आलेले अवशेष दाखवून देत होते की सिंधू संस्कृती एक प्रगती संस्कृती होती. ते शेती करायचे, गायी, बैले असे प्राणी पाळायचे, घाटाची भांडी स्वैपाकाला वापरायचे. इतकच काय त्यांनी शहरे वसवली होती. त्याच्या अभ्यासातून बरीच माहिती समोर येत होती. मात्र फाळणीनंतर हे सिंधू संस्कृतीचे अवशेष पाकिस्तानात राहिले.

भारतात इतरत्र या संस्कृतीची अवशेष शोधून काढण्याचे प्रयत्न सुरु झाले.
एकदिवस एका वर्तमानपत्रात बातमी आली की महाराष्ट्रातील अहमदनगर जिल्ह्यातील दायमाबाद येथे गुराखी मुलांना काही जुन्या मुर्त्या सापडल्या आहेत. श्रीरामपूरच्या पोलिसांनी त्या ताब्यात घेतल्या आहेत. पुरातत्व शास्त्रज्ञानी जाऊन पाहिल्यावर त्यांच्या लक्षात आलं की हे सिंधू संस्कृतीला समकालीन अवशेष आहेत.

भारतीय पुरातत्वखात्यातर्फे डॉ. शंकरराव साली यांनी तिथे मोठ्या प्रमाणात उत्खनन केले. त्या मुर्त्या इ.स. पूर्व २२००-२००० म्हणजेच जवळपास साडेचार हजार वर्षापूर्वीच्या होत्या.

उत्तरेतील पर्यावरण प्रतिकूल होऊ लागल्या मुळे या काळात तिथल्या लोकांनी स्थलांतरे सुरु केली. सरस्वती नदी आटू लागली होती. पावसाचे प्रमाण कमी झाले होते. शेती करणे अशक्य होऊ लागले. हेच शेती करणारे लोक गुजरात महाराष्ट्र येथे नद्या काठी येऊन वसले.

गोदावरी नदीच्या खोऱ्यात प्रवरा नदी जवळ दायमाबाद येथे सापडलेल्या अवशेषांमध्ये एका ओळीत आखणी केलेली कच्च्या विटांची घरे सापडली. यात धान्य साठवण्यासाठी वेगळी खोली, गुरांचा गोठा देखील आढळून आला. याचाच  अर्थ हा शेतकरी पशुपालनाला देखील तितकेच महत्व देत होता,

हे हजारो वर्षापूर्वीचे शेतकरी त्याकाळच्या मानाने प्रगत होते.
शेतीसाठी ते लाकडी नांगर वापरायचे.  नदीच्या पाण्याचा वापर ते सिंचनासाठी करत. त्याकाळात त्यांनी गहू, तांदूळ, बार्ली, मसूर,वाटाणे, तीळ या पिकाच उत्पादन घेतल्याचे पुरावे मिळाले आहेत. या शेतकऱ्याच्या स्वैपाकघरात चुली होते. त्यांची भांडी मात्र भाजून बनवलेली होती. यात लहानमोठे घडे, रांजण,वाडगे देखील होते. त्यांना रंगवलेही जात होते. त्याकाळच्या कुभाराची भट्टीदेखील सापडली आहे.

पुढे या ताम्रपाषाण युगीन माळवा संस्कृतीमधून महाराष्ट्राच्या जोर्वे संस्कृतीचा उगम झाला. संपूर्ण राज्यभर या शेतकरी संस्कृतीचे अस्तित्व आढळून आले. ही सारी स्वयंपूर्ण खेडी होती.

पुण्याजवळच्या इनामगाव येथे देखील जोर्वे संस्कृतीचे अवशेष सापडले.

इनामगाव येथे घाटगे घराण्याची प्राचीन गढी आहे. तिच्याजवळ हाडे सापडत असल्यामुळे गावकरी या भागात कधी जात नसायचे. पण १९६८ साली तिथे केलेल्या संशोधनानंतर सापडलं की हे जोर्वे कालीन दफनभूमीचे अवशेष आहेत.  तिथे एका टेकडीवर प्रागऐतिहासिक काळातील खेडदेखील सापडले. या घरांचे वैशिष्ट्य म्हणजे तिथे अंगणात भाकरी भाजण्यासाठी भले मोठे चुलाने सापडले. धान्यसाठवण्यासाठी कणगीची सोय देखील आहे.

इनामगाव आणि दायमाबाद या दोन्ही ठिकाणच्या संशोधनावरून असे सिद्ध होते की तेथील शेतकरी रब्बी व खरीप या दोन्ही प्रकारचे पिक घेत होते.
इनामगावजवळ पाउस जास्त झाल्यावर घोडनदीला पूर येत असे. या पुराचे पाणी एका नाल्यावाटे वळवून साठवून ठेवायची दूरदृष्टी देखील हजारो वर्षापूर्वीच्या आपल्या पूर्वजांनी केली होती.

त्याकाळात दगडी हत्याराचा वापर जास्त केला जायचा. या सोबतच कुऱ्हाड, छन्नी अशी तांब्याची हत्यारे देखील आढळून आली.याच शिवाय त्याकाळच्या शेतकरी महिला थोड्या प्रमाणात का होईना सोन्याचे दागिने देखील वापरायची. कर्णफुले, सोन्याचा मणी आढळले आहे. तसेच इनामगाव येथे सोनाराच घर सापडलं आहे. त्यात मूस,तांब्याचे चिमटे होते.

या जोर्व्हे संस्कृतीच्या धार्मिक समजुतीबद्दलचा अभ्यास अजूनही चालू आहे. दायमाबाद आणि इनामगाव येथे शिरोहीन देवतेच्या मातीच्या मुर्त्या सापडतात. काही ठिकाणी मातीची चित्रे देखील सापडली. एक तर ती लहानमुलांची खेळणी असावीत अथवा गावजेवणापूर्वी एखादी पूजाविधी असावी.

दायमाबाद येथे खापरावरील रंग आढळते. येथे तांब्याचा गेंडा, रथ, हत्ती यांच्या जवळजवळ ६५ किलो वजनाच्या मूर्ती आढळल्या.

तिथे सापडलेल्या मुर्त्यामध्ये सर्वात महत्वाची मूर्ती आहे ती बैल जोडी च्या रथात बसलेल्या देवाची. सिंधू लिपी अद्याप वाचली गेली नसल्यामुळे हा देव कोण याच उत्तर मिळाल नाही पण तो शेतीशी संबंधित देव असावा.

सिंधू संस्कृती आणि जोर्वे संस्कृतीमधला फरक म्हणजे ही संस्कृती पूर्णपणे ग्रामीण होती.

जवळपास १००० वर्षे ही संस्कृती टिकली. इस.पूर्व १००० नंतर इथल हवामान देखील प्रचंड बदलले. या प्रतिकूल वातावरणामुळे ताम्रपाषाणयुगीन शेतकऱ्यांना एकेठिकाणी वस्ती करून स्थिर जीवन जगणे अशक्य बनले. त्यामुळे हा महाराष्ट्राचा आद्य बळीराजा परत कंदमुळे आणि शिकारीच्या शोधात हा भाग सोडून बाहेर पडला. या वसाहती रिकाम्या झाल्या.

त्यांनतर मात्र या भागात तीन हजार वर्षे कोणीही वस्ती केली नाही यामुळे हे अवशेष जमिनी खाली शाबूत राहिले.


असा वसला महाराष्ट्र! महाराष्ट्राचा आदिम इतिहास
Submitted by वरदा on 24 September, 2009 - 04:31
jorwe pot.jpg(छायाचित्र प्रताधिकारः श्री पद्माकर प्रभुणे)

सहसा महाराष्ट्राचा सर्वात प्राचीन इतिहास म्हणजे आपल्याला सातवाहन काळातली लेणी वगैरे माहित असतं. ज्यांना थोडाफार जुनी पुस्तकं धुंडाळायचा नाद असतो त्यांनी महाराष्ट्राचे आद्य रहिवासी कोण? शक/नाग/आभीर, पुराणांतरींचे पुरावे काय सांगतात? वगैरे चर्चा वाचलेल्या असतात. पण या सगळ्या माहिती-चर्चा-वादाच्या जंजाळात पुरातत्वीय पुरावे सर्वसामान्यांपर्यंत फारसे चटकन पोचत नाहीत आणि अद्ययावत शास्त्रीय माहितीबद्दल बहुतांशी वाचक अनभिज्ञच रहातात. हे असं पुरातत्वीय संशोधन महाराष्ट्राच्या जडणघडणीबद्दल, इथल्या आद्य रहिवाशांबद्दल, त्यांच्या जीवनशैलीबद्दल काय सांगतं हे जाणून घेण्यासाठी, सगळ्यांपर्यंत पोचवण्यासाठी हा लेखनप्रपंच. (इथे लिहिलं आहे त्यापलिकडे अजून संशोधन फारसं झालेलं नाही. जे झालंय/चाललंय ते प्रकाशित झालेलं नाही. जेव्हा होईल तेव्हा इथे अपडेट मारेनच. तेव्हा इथे जे लिहिलंय ते सध्यापुरतं अंतिम सत्य मानायला हरकत नाही)

मुळात महाराष्ट्राच्या इतिहासाची साकल्याने चर्चा इतिहासाचार्य राजवाडे, राजारामशास्त्री भागवत आणि ज्ञानकोशकार केतकर यांनी सुरू केली. याच्या थोडं आधीपासूनच भाऊ दाजी लाड, भगवानलाल इंद्रजी, जॉर्ज ब्यूह्लर (Bühler) इत्यादी इंडॉलॉजिस्ट्सनी प्राचीन इतिहासाची साधनं अभ्यासायला सुरूवात केली होती. त्याचबरोबर आर्कियॉलॉजिकल सर्व्हे ऑफ इंडिया च्या डी. आर. भांडारकर, हेन्री कझिन्स अशा अधिकार्‍यांनीही महाराष्ट्रातील (तेव्हाची बॉम्बे प्रेसिडेन्सी) पुराणवस्तू-अवशेषांचा अभ्यास करण्याचे काम हाती घेतले होते. पण तत्कालीन राजकीय पार्श्वभूमीमुळे जीवन झोकून देऊन स्वखर्चाने काम करणारे राष्ट्रवादी (nationalist) इतिहासकार आणि तितक्याच तळमळीने पण सरकारी संस्थांबरोबर/ त्यांच्या सहाय्याने काम करणारे इंडॉलॉजिस्ट्स आणि पुरातत्त्वशास्त्रज्ञ यांच्यात कायमच एक दरी राहिली. दुर्दैवाने दोघांनीही एकमेकांच्या कामाची फारशी दखल घेतलेली दिसत नाही. त्यातच राष्ट्रवादी मराठीत लिहिणार तर सरकारी अहवाल आणि अमराठी लोकांनी केलेले संशोधन इंग्लिशमधे हा मुद्दा होताच. शिवाय बहुतेक राष्ट्रवादी इतिहासकारांच्या संशोधनाचा केंद्रबिंदू स्वाभाविकपणे शिवकाळ / मराठा काळ होता तर प्राचीन इतिहास व संबंधित शिलालेख, नाणी, मंदिरे - लेण्या, उत्खनने हे सगळं बर्‍यापैकी सरकारी अखत्यारीत होतं - ज्याला आपण colonial Indology and archaeology असं म्हणतो.

१९४०-४५ पर्यंत महाराष्ट्रात अगदीच तुरळक उत्खनने झाली. उदा: निझाम सरकारच्या पुरातत्त्व खात्याने केलेले पैठण येथील व भारत इतिहास मंडळाने केलेले कराड येथील उत्खनन.. पण त्यात मिळालेले पुरावे अगदीच मर्यादित होते आणि त्यामुळे महाराष्ट्राच्या इतिहासाच्या रूपरेखेत फारसा बदल झाला नाही. स्वातंत्र्यप्राप्तीनंतर मात्र पुरातत्त्वशास्त्रीय संशोधनाला महाराष्ट्रात चांगलाच वेग आला आणि या प्रदेशात मनुष्यवस्ती कधीपासून झाली आणि त्यात कसे आणि कोणते बदल होत गेले याचे एक बर्‍यापैकी सुसंगत चित्र आपल्यासमोर उभे राहिले.
अजूनही नित्य नूतन संशोधन होतच आहे. आज आपण इथे जी माहिती वाचणार आहोत ती बहुतांशी या पुरातत्त्वीय आणि ऐतिहासिक साधने आणि संशोधनावर आधारित आहे.

काय असतात ही साधने? हे पुरातत्त्वीय पुरावे?
आपल्याला सगळ्यांनाच माहित आहे की पुरातत्त्वशास्त्रज्ञ भूभागाचे सर्वेक्षण करून जुन्या मानवी वस्तींची ठिकाणे शोधून काढतात आणि त्यातील महत्त्वाच्या ठिकाणी उत्खनन करून त्या वसाहतींच्या अवशेषांचा अभ्यास करतात. सर्वसामान्यपणे उत्खननात मिळणारे अवशेष म्हणजे घरांच्या जमिनी/ plans, खापरांचे तुकडे, हाडे, दगडाची व धातूची औजारे व हत्यारे, दफने, धान्याचे जळालेले दाणे, मणी, राख, माती, इ,. या सगळ्याचे परीक्षण करून विविध निष्कर्ष काढले जातात व शक्य असेल तिथे कालमापन पध्द्ती वापरून या अवशेषांचे वयोमान ठरवतात. इतिहासपूर्व काळात, लिखित स्वरूपाचे कुठलेही पुरावे नसताना, फक्त याच पुराव्यांचे दुवे जुळवत आपल्याला पुढे जायला लागते.
एकदा ऐतिहासिक कालखंडात आलं की या सगळ्या गोष्टींबरोबरच शिलालेख, ताम्रपट, नाणी, ग्रांथिक पुरावे, वास्तुकला, ही साधनेही मदतीला येतात. आणि या सगळ्याचा साकल्याने अभ्यास करून आपल्याला इतिहास लिहिता येतो.

१९४७ पर्यंत महाराष्ट्राचा इतिहास फक्त दोन हजार वर्षे मागे नेता येत होता. सातवाहन राजांचे शिलालेख, नाणी, तत्कालीन लेणी इ. पुराव्यावरून हे महाराष्ट्रातलं पहिलं राजकुल असावं असा निष्कर्ष संशोधकांनी काढला होता. पण त्याआधी इथे कुणाची वसाहत होती? किती आधीपासून होती? या प्रश्नांची उत्तरं मात्र मिळत नव्हती. मग त्या स्पष्टीकरणासाठी पुराणांतरी उल्लेख आलेल्या शक, नाग, हूण अशा वेगवेगळ्या कुलांच्या स्थलांतरांमधे धांडोळा घेतला जात होता (पहा :- राजवाडे, केतकर, भागवत, इ. इ.). हे सगळं चित्र अचानक बदललं. कसं? त्याचीही कहाणी तितकीच रंजक आहे..

भारतातल्या इतर लाखो खेडेगावांसारखंच एक जोर्वे होतं. संगमनेरच्या पूर्वेला ६ मैलांवर, प्रवरेच्या काठी वसलेलं एक सर्वसाधारण खेडं. आपल्याकडे तशी अधूनमधून अस्मानी संकटं येत असतात, त्याचाच एक प्रकार म्हणून १९४७ साली प्रवरेला मोठ्ठा पूर आला. या पुरात गावच नव्हे तर शेतंसुद्धा पाण्याखाली गेली. परत अशा प्रकोपाला तोंड देणं सोयीचं व्हावं म्हणून गावाने नदीच्या काठापासून थोडी आत, चढावर वस्ती हलवली आणि आसपासची जमीन शेतीखाली आणायचं ठरवलं. आणि काय आश्चर्य! शेतीत नांगरताना अफुट, अखंड, मातीची भांडी सापडायला लागली. नेहेमीसारखी करडी, काळी, लालसर माठाची मडकी नव्हेत तर अगदी उत्तम भाजणीची, लाल रंगाची, वरती काळ्या रंगाने सुंदर नक्षीकाम केलेली तोटीची भांडी! आणि तांब्याची कुर्‍हाडीची पाती.
कुठल्याही गावाला जशी स्थानिक परंपरा, मौखिक गोष्टींतून चालत आलेला इतिहास असतो, तसा जोर्वेला सुद्धा होता. म्हणे कोणे एके काळी ही खुद्द जरासंधाची नगरी होती. त्यामुळे ही मडकी नक्कीच अशी पुराणकाळातली असली पाहिजेत असं आसपासच्या लोकांना वाटलं असणार!
ही सगळी बातमी कानोकानी होत होत पोचली ती संगमनेरच्या तालुका डेव्हलपमेन्ट बोर्डमधे काम करणार्‍या शंकर साळी नामक तरुणाकडे. त्याने उत्साहाने या गावाला भेट देऊन ती खापरं पाहिली आणि त्यासंबंधी एक छोटीशी बातमी दैनिक भारत या स्थानिक वृत्तपत्रात छापून आणली. आणि ही सगळी माहिती आणि खापरं घेऊन गाठलं या क्षेत्रातल्या एका जाणकाराला! डॉ. ह धी. सांकलिया यांना.

त्यावेळी पुण्याच्या डेक्कन कॉलेज या संस्थेत नुकताच पुरातत्त्वशास्त्राचा विभाग सुरू झाला होता. डॉ. ह. धी. सांकालिया या तरुण पुरातत्त्वशास्त्रज्ञाची तिथे नेमणूक करण्यात आली होती. मुंबईत संस्कृत शिकून, इंडॉलॉजीचा अभ्यास करून, नंतर इंग्लंडमधे खुद्द मॉर्टिमर व्हीलर नामक प्रख्यात पुरातत्त्वज्ञाच्या हाताखाली त्यांनी प्रशिक्षण घेतले होते. इथे विद्यापीठ पातळीवर सरकारी चौकटीच्याबाहेर नव्याने पूर्ण विभागाची/ज्ञानशाखेची उभारणी करण्याचं काम मोठ्या तडफेने त्यांनी सुरू केले. त्याचा एक भाग म्हणून नाशिक या पुरातनकालापासून अस्तित्वात असलेल्या नगरीचे उत्खनन करायचं ठरलं होतं. श्री. साळींनी आणलेली खापरं त्यांनी पाहिली आणि जोर्वेलाही छोटंसं उत्खनन करायचं असं ठरवलं.
१९५० साली उत्खनन केल्यावर ही खापरं एका ग्रामसंस्कृतीची निदर्शक आहेत हे कळलं; पण पुढच्या मागच्या वसाहतीचा कुठलाच मागमूस नसल्याने आणि तोपर्यंत शास्त्रीय कालमापन पद्धती अस्तित्वात नसल्याने महाराष्ट्राच्या सांस्कृतिक कालानुक्रमात हे सगळं कुठं बसवायचं हा प्रश्नच होता! नाशिकच्या उत्खननाने मात्र हा प्रश्न समूळ सोडवला. तिथे सातवाहनकालीन वसाहतीच्या खालच्या थरांमधे अशीच रंगीत, नक्षीदार खापरं आणि ग्रामसंस्कृतीचे अवशेष मिळाले. आत्तापर्यंत हे ही स्पष्ट झालं की या समाजाला लोखंड बनवायचं तंत्रज्ञान अजून अवगत झालं नव्हतं. माहित होतं फक्त तांबं आणि दगड - म्हणून यांना ताम्रपाषाणयुगीन वसाहती म्हणतात.
अशा तर्‍हेने महाराष्ट्रातील वसाहतींचा इतिहास एकदम २००० वर्षे मागे गेला आणि इतिहासपूर्वकालीन महाराष्ट्राच्या संशोधनाला जबरदस्त चालना मिळाली!
एकदा जोर्वेचा शोध लागल्यानंतर आसपासच्या प्रदेशातून आणि पूर्ण पश्चिम आणि उत्तर दख्खनच्या पठारावर तसेच महाराष्ट्र - कर्नाटक सीमाभागातही अनेक ताम्रपाषाणयुगीन वसाहती सापडल्या, सापडत राहिल्या. आणि डेक्कन कॉलेजच्या पुढाकाराने जवळजवळ २० स्थळांचे लहानमोठ्या प्रमाणात उत्खननही झाले. यात तापी खोर्‍यातील प्रकाश, सावळदा, बहाळ, टेकवडे, कवठे, गोदावरी-प्रवरा खोर्‍यातील दायमाबाद, नेवासा, आपेगाव तसेच भीमा खोर्‍यातील शिरूरजवळ इनामगाव, बारामतीजवळचं सोनगाव, थेऊर इत्यादी स्थळांचा प्रामुख्याने समावेश होतो. या उत्खननांमुळे आज आपल्याला महाराष्ट्राच्या इतिहासपूर्व कालीन आदिम वसाहतींचा चेहरामोहरा कसा होता हे सांगता येतं.
Picture1.jpg

(जाता जाता थोडं विषयांतर:- या शोधाने एका व्यक्तीचं आयुष्यच पूर्ण बदलून टाकलं. संगमनेरच्या तालुका डेव्हलपमेंट बोर्डमधे नोकरीला असलेल्या श्री. शंकर अण्णाजी साळी या तरुणाचं. स्वतःची नोकरी सोडून हा चक्क पुरातत्त्वशास्त्राच्या विद्याभ्यासामागे लागला. एवढंच नव्हे तर डेक्कन कॉलेजमधून शिक्षण पूर्ण करून ASI (Archaeological Survey of India) मधे चांगला हुद्दा पटकावला. आणि कालांतराने याच ताम्रपाषाणयुगीन संस्कृतीचे महाराष्ट्रातील सर्वात मोठे स्थळ दायमाबाद याचे यशस्वीरित्या उत्खननही केले!!)

तर महाराष्ट्रात आदिमानवाचा वावर सुमारे ७ -८ लाख वर्षांपासून होता असे दिसून येते. हा अश्मयुगीन मानव समाज भटका आणि शिकारी असल्याने त्याच्या घराबिरांचे अवशेष मिळणार नाहीत हे उघडच आहे. आपल्याला मिळतात ती फक्त त्यांनी बनवलेली दगडांची हत्यारं. अशी ७ लाख वर्षांपूर्वीची प्राचीन हत्यारं सापडली आहेत मोरगाव (हो, गणपतीचं मोरगाव!), जुन्नरजवळ बोरी आणि नेवाश्याजवळ चिरकी नाला (अंदाजे ३.५ लाख वर्षं) येथील उत्खननात. अशीच एक - थोडीशी नंतरच्या काळातील - वसाहत सापडली जळगाव जिल्ह्यात पाटणे येथे. सुमारे २५ ते ३०,००० वर्षांपूर्वीच्या या हत्यारांबरोबरच रेघांनी सुशोभित केलेलं शहामृगाच्या अंड्याचं एक टरफलही सापडलं..

ही अशी लाखो वर्षं भटक्या अवस्थेत काढल्यानंतर सुमारे साडेचार हजार वर्षांपूर्वी महाराष्ट्रात शेतीच्या तंत्रज्ञानाचा प्रसार व्हायला हळुहळू सुरूवात झाली. भारतात शेतीच्या तंत्रज्ञानाचा उगम कमीतकमी ३ ठिकाणी स्वतंत्रपणे झाला असं आता संशोधकांना मान्य आहे. यातील एक केंद्र बलुचिस्तान प्रांत (ई.स. पू. ६०००) - ज्यातून पुढे सिंधू संस्कृती उदयाला येण्यास हातभार लागला, दुसरे विंध्य - कैमूर पर्वतातील अलाहाबाद आणि गंगा यामधला बेलन खोर्‍याचा भाग (ई.स. पू. ६००० - ७०००) आणि तिसरे ईशान्य भारत.

आपल्या आधी राजस्थान, गुजरात, माळवा या प्रदेशांमधे शेती करणारा समाज उदयाला आला होता. तिथेही ही वाटचाल अश्मयुगाकडून शेतीकडे अशी सलग झाली. त्यांच्याकडूनच उपजीविकेच्या या नव्या तंत्राची ओळख नर्मदेच्या दक्षिणेला रहाणार्‍या मानवसमूहाला झाली असं दिसतं. या सर्व प्रसारामधे मात्र एका लोकसमूहाने विविध ठिकाणी पांगून जाऊन, नव्या वसाहती करून शेतीची ओळख त्या त्या प्रदेशाला करून दिली असं काही दिसत नाही. त्या त्या प्रदेशातील स्थानिक लोकांनी शेजारच्या शेती करणार्‍या समाजांकडून हे नवं तंत्र आत्मसात करून घेतलं.

असो. परत येऊया महाराष्ट्रातील आदिम वसाहतींकडे..
आपल्याकडील ताम्रपाषाणयुगीन वसाहतींचा कालखंड सुमारे इ.स. पूर्व २४५० ते इ.स. पूर्व ९००/७०० असा आहे.
या वसाहतींचा आढावा घेताना आपण एकत्रच या सगळ्या कालावधीचा विचार करणार आहोत. अजूनही आपल्याला मध्याश्मयुगातून नवाश्मयुगात/ ताम्रपाषाणयुगात (म्हणजे आदिमानव ते शेतकरी - पशुपालक) समाजाची वाटचाल दाखवणारा कुठलाही ठोस पुरातत्त्वीय पुरावा महाराष्ट्रात सापडलेला नाहीये. आपल्याला उपलब्ध असलेल्या उत्खनित पुराव्यावरून असे दिसते की गुजरातमधून आपल्याकडे या शेती तंत्रज्ञानाचा प्रसार झाला असावा.
धुळे जिल्ह्यातली कवठे इथली वसाहत अशा नव्याने शेती शिकलेल्या समाजाची प्रथम वाटचाल दाखवते. इ. स. पूर्व २४५० च्या आसपासचं हे गाव हंगामी होतं. जेवढं शेतीवर तेवढंच पशुपालन आणि शिकारीवर अवलंबून होतं. पूर्ण वर्षभर एकाच ठिकाणी मुक्काम करत नसल्याने अत्यंत कमी श्रमात बांधल्या जाणार्‍या गोल झोपड्यांचा वापर ते करत. या झोपड्यांच्या जमिनी थोड्याशा खोल खड्ड्यासारख्या केलेल्या असत (pit dwellings). एका 'घरात' रहाण्याच्या खड्ड्याशिवाय कोंबड्या ठेवायला/ साठवणीसाठी इ. २-३ खड्डे असत.

कवठे येथील घर
kaothe.jpg

अशी हंगामी गावं लौकरच कायमस्वरूपी स्थिरावली, शेतीच्या तंत्रातही प्रगती झाली आणी त्यांचे रूपही पालटले.
आजवर अशी १५०हूनही जास्त स्थळं उजेडात आली आहेत. जरी या सर्व वसाहती ग्रामीण होत्या तरीही त्यांच्यातही फरक होते. यातली काही गावे बर्‍यापैकी मोठी होती. दायमाबाद सगळ्यात जास्त - म्हणजे जवळजवळ ३०हेक्टर मोठं होतं आणि त्याला तटबंदी होती तर इनामगाव आणि प्रकाश ५ हे. च्या आसपास. बाकीच्या वस्त्यांचं आकारमान मात्र १ ते ३हे. च्या मधे होतं. यांमधे स्थायी स्वरूपाची खेडी, हंगामी वाड्या, असे विविध प्रकार होते. या सगळ्या वसाहती काळ्या मातीच्या (black cotton soil), चराऊ कुरणांच्या आणि जलस्रोतांच्या सान्निध्यात वसलेल्या होत्या.

गावात आखीवरेखीव रस्ते बहुदा नसतच पण आजच्या खेड्यांसारखंच घरांच्या मधल्या जागेचा वापर गल्लीबोळांसारखा केला जात असावा. बहुतेक सगळी घरं चौकोनी आणि कुडाची असत. शिवाय बाभूळ, सागवान, धावडा, खैर, बांबू, रोझवुड अशा झाडांची ला़कडे घरबांधणीत वापरली जात असत (मुख्यतः खांबांसाठी). जमिनी मुरूम्,माती टाकून चांगल्या चोपून मग मातीने, शेणाने किंवा क्वचित चुन्याने सारवलेल्या असत. बहुतेक घरं एक किंवा दोन खोल्यांची. एका मोठ्या खोलीत मधे कुडाने पार्टिशन करून एका बाजूला चूल आंणि साठवणीची जागा असंही बर्‍याच घरांमधे आढळून आलंय. अपवाद म्हणून काही घरं ४-५ खोल्यांची असत. ती कदाचित गावातल्या महत्त्वाच्या व्यक्तींची असावीत. सगळ्या घरांना छान सारवलेली अंगणं असत. घरांची छपरं गवताने शाकारलेली असत. घरांमधे हमखास आढळणार्‍या गोष्टी म्हणजे चूल, साठवणाची सोय आणि पाटा-वरवंटा. (त्या काळातला पाटा थोडासा रगड्यासारखा खोलगट आणि वरवंटा म्हणजे गुळगुळीत गोटा असे..)
इनामगावला मिळालेल्या घरांचे आराखडे
inm.jpg

यात सर्वात लक्षवेधक काय असेल तर साठवणीसाठी असलेल्या विविध सोयी. आजच्यासारखंच बेभरवशी अर्धशुष्क हवामान तेव्हाही होतं. त्यामुळे वरकड धान्य साठवणं तेव्हाही महत्त्वाचं असणार! साठवणीसाठी वापरण्यात येणारे भक्कम मोठ्ठाले रांजण तर उत्खननांमधे सापडलेच आहेत. पण त्याशिवायही मातीत खड्डे खणून त्यांना चुन्याचा गिलावा देऊन धान्य साठवले जात असे. शिवाय मातीचे गोल कट्टे करून त्यात वाळू आणि बोरीचे काटे घालून (खालून उंदीर-घुशी लागू नयेत म्हणून) त्यावर कणग्या ठेवत असावेत. काही खास चार लांब पाय असलेले रांजण ४ दगडांच्या टेकूने किंवा ४ खळग्यांमधे उभे करून त्यातही साठवण केली जात असे. इनामगावला तर या सगळ्या घरोघरच्या साठवणीव्यतिरिक्त एक स्वतंत्र धान्याचं कोठारच होतं. बहुतेक गावाच्या मालकीचं.

चूल म्हणजे काही वेळा नालाच्या आकारात मातीने बांधून काढलेली पण बहुतेक वेळा एक उथळ खड्डा, त्यात मध्यभागी भांड्याला आधार म्हणून एक दगड किंवा मातीचा उंचवटा. या खड्ड्याचे काठ जमिनी पासून थोडे उचललेले - गरम राखबिख बाहेर सांडू नये यासाठी. काट्याकुट्यांच्या सरपणाबरोबरच शेणाच्या गोवर्‍याही इंधन म्हणून यात स्वाहा होत.

एरवी घरात भांडीकुंडी सगळी मातीची. या गाडग्यामडक्यांचे प्रकार तरी किती! रांजण, हंड्या, तपेली, लोट्या (तोटीच्या/ बिनतोटीच्या), छोटेमोठे वाडगे, थाळ्या, झाकणं, तसराळी, चंबू, गडू, इ.इ.. यातले काही प्रकार सोडले तर खूपशी भांडी गेरू-लाल रंगाची. आणि त्यावर काळ्या रंगाने ठसठशीतपणे काढलेली नक्षी - विशेषतः वाडग्यांवर. हे वाडगे म्हणजे तत्कालीन 'टेबल वेअर' म्हणाना! त्यामुळे आज जशी टेबल वेअरमधे विविध डिझाइन्स असतात, तसंच काहिसं! अगदी सुरुवातीच्या काळात भांड्यांवर प्राणी, पक्षी यांची चित्रं आढळतात. नंतर मात्र रेघारेघांची किंवा फ्री हँड नक्षी मोठ्या प्रमाणात दिसून येते. या भांड्यांबरोबरच छानपैकी चौकोनी, लंबगोल अशा आकाराच्या पणत्यासुद्धा मिळतात.
(या लेखाच्या प्रारंभालाच इनामगाव येथून मिळालेल्या एका संपूर्ण हंड्याचं छायाचित्र आहे त्यावरून रंगाची कल्पना येईलच. त्या हंड्यावर एक हरीण/अ‍ॅन्टेलोप काढलेलंही स्पष्ट दिसत आहे)
mlw ware.jpgbowls.jpglamps_0.jpg

रोजची औजारं-हत्यारं बघायची झालं तर दगडाची जास्त आणि तांब्याची कमी (कारण दगडाला असलेली जास्त धार आणि तांब्याची मर्यादित उपलब्धता). वाळूत घासून घासून गुळगुळीत चकचकीत केलेल्या दगडाच्या कुर्‍हाडी, गारगोटीचे छिलके काढून तयार केलेली सूक्ष्म पण अत्यंत धारदार पाती (ही लाकूड किंवा हाडाच्या खोबणीत एकापुढे एक बसवून विळा, कोयता, सुरी अशांसारखी हत्यारं तयार व्हायची!), तांब्याच्या कुर्‍हाडी, छिन्नी, तांब्याचे गळ, हाडांनी, दगडांनी तयार केलेली बाणाची टोकं, असं काय काय!

लोक कपडेबिपडे घालत होते की नाही हे समजायला फारसा पुरावा नाही. पण बहुदा भाजक्या मातीच्या 'टकळ्या' असाव्यात अशा काही वस्तू उत्खननांमधे मिळाल्यात. अर्थात इतर प्राचीन समाजांप्रमाणेच इथेही नाना प्रकारचे अलंकार वापरात असलेले दिसतात. भाजक्या मातीच्या, शंखाच्या, तांब्याच्या बांगड्या ;भाजक्या मातीची कर्णभूषणे ; आणि वेगवेगळ्या प्रकाराच्या मण्यांच्या माळा - पांढरे पट्टेरी अ‍ॅगेट, केशरी कार्नेलियन, दुधाळ पांढरा चाल्सीडोनी, पारदर्शक स्फटिक, लालसर/हिरवा जास्पर, हस्तिदंत, सोनं, तांबं, माती, शंख असे किती किती मणी उत्खननांमधून मिळालेत.

उपजीविकेसाठी शेती, पशुपालन, मासेमारी, शिकार, याच्याच जोडीला जंगलातून विविध गोष्टी गोळा करून आणणं (foraging) असे वेगवेगळे मार्ग हे लोक अवलंबत असत.
आपल्याला पुरावा पाहून आश्चर्य वाटतं पण ४००० वर्षांपूर्वीच दख्खनच्या पठारावर खरीप आणि रब्बी पिकं घ्यायला सुरुवात झाली होती. विविध प्रकारची धान्यं, डाळी, कडधान्यं, तेलबिया यांचा समावेश यात होता. गहू, जव, तांदूळ, नाचणी, ज्वारी, बाजरी, राळं, मसूर, हरभरा, तूर, मूग, उडीद, कुळीथ, वाटाणा, वाल, अळशी, तीळ ही पिकं नियमितपणे घेतली जात होती. गव्हासारख्या पिकाला पाणी लागतं म्हणून इनामगावच्या लोकांनी नदीच्या पाण्याचा कालवा/ पाट काढून पुराचं जास्तीचं पाणी शेतीला मिळावं असी व्यवस्था केली होती.
शेतीसाठी वापरात आणलेली काही अवजारंही आपल्याला उत्खननात मिळाली आहेत. यात हरणाच्या शिंगापासून (antlers) बनवलेले छोटे नांगर, बैलाच्या खांद्याच्या हाडापासून बनवलेलं छोटं नांगराचं काम करणारं पातं, तसंच हरणाचं शिंग पोकळ करून त्यातून पेरणी करताना बिया सोडण्यासाठी केलेलं seed drill (याला मराठीत काय म्हणतात बरं?) यांचा समावेश आहे.

antler hoe.jpgseed drill.jpg

पाळीव प्राण्यांमधे गाय-बैल, म्हशी, शेळ्यामेंढ्या, गाढवं, कोंबड्या, डुकरं, आणि कुत्री, मांजरं यांचा पुरावा आढळतो. घोडा आढळतो पण तो अगदी शेवटच्या कालखंडात (बहुदा दक्षिण भारतातल्या लोहयुगीन लोकांच्या संपर्कामुळे).
शिकार करून आणलेल्या प्राण्यांची यादीही अशीच लांबलचक आहे - ८/९ जातींची हरणं, रानडुक्कर, नीलगाय, अस्वल, माकड, वाघ, बिबळ्या, मुंगूस, ससा, रानमांजर, कोल्हा, लांडगा, साळिंदर, घोरपड, खार, मगर, कासव, मोर, माळढोक, कबुतर, बदक, खेकडे, मासे, इ.
या लोकांच्या आहाराचा मुख्य घटक हा गोमांस होता. त्याच बरोबर इतर प्राण्यांचेही मांस, मासे, धान्य, कडधान्य हे होतंच. याचबरोबर वस्तीच्या आसपास सहज उपलब्ध होणारी फळं (बोरं, जांभळं, आवळे, शिंदीचा खजूर, चारोळ्या) पालेभाज्या (चाकवत, घोळ, मेथी) यांचाही समावेश खाण्यात होत असणार असं पुरावनस्पतिशास्त्रीय पुरावा आपल्याला सांगतो.

या सगळ्या रोजच्या उद्योगांशिवाय काही कारागिरीची कामंही केली जात. यात प्रामुख्याने कुंभार, तांबट, मणिकार, लोणारी (चुना तयार करणारा), अशा कारागिरांचा समावेश होतो. दगडांची हत्यारं बहुतेक सर्व कुटुंबं आपापलीच बनवत.
हे सर्व 'कुटिरोद्योग' ज्याच्यात्याच्या घरातच चालत. त्याच्यासाठी वेगळं वर्कशॉप वगैरेची भानगड नव्हती.
इनामगावच्या उत्खननात एक फार सुंदर कुंभाराचा आवा मिळाला. त्यात जास्तीची गरम हवा निघून जाण्यासाठी, इंधनासाठी वेगवेगळ्या वाटा केलेल्या होत्या. या भट्टीमधे ६००-७०० डिग्री सेंटीग्रेड तापमान कायम ठेवून छान खणखणीत गाडगी भा़जली जात. अशा प्रकारच्या भट्ट्या आणखीही असणार हे सरळ आहे. पुरावा म्हणजे ढिगाने सापडणारी खणखणीत वाजणारी रंगीत नक्षीदार खापरं!

kiln.jpg

आणि इतकंच तापमान, नियंत्रित करून हवा तितका वेळ ठेवल्याशिवाय तांबं तरी कसं गाळणार? तांबं देखील छोट्या भट्ट्यांमधे गाळलं जायचं. अशुद्ध गाळ एकीकडे तर शुद्ध रस खापराच्या मुशीत!

एकूणच ही गावं उपजीविकेच्या प्राथमिक पातळीवर तरी स्वयंपूर्ण होती. असं असलं तरीही खिल्लारं आणी शेळ्यामेंढ्या घेऊन निदान काही लोक तरी वर्षातील काही काळ चराऊ कुरणांच्या मागे भटकत असणार. कारण उपजीविकेच्या दृष्टीने फक्त वस्तीच्या आसपासच्या पर्यावरणाचा सतत उपभोग घेऊन त्या संसाधनांवर ताण पडू नये म्हणून बहुतेक प्राचीन समाज असा 'भटका' मार्ग स्वीकारत. चराऊ कुरणांच्या जवळ सापडलेल्या अनेक हंगामी छोट्या वस्त्या याचंच निदर्शक आहेत. शिवाय सामाजिक नातेसंबंध वाढवायचे असतील तर आसपासच्या समाजाशी कायमस्वरूपी संपर्क ठेवण्याची गरज असते.
या परस्पर संबंधांचा आणखी एक पुरावा म्हणजे दूरदूरच्या प्रदेशांतून आयात केलेल्या गोष्टी. या दख्खनच्या पठारावर रहाणार्‍या ताम्रपाषाणयुगीन लोकांचे अनेक प्रदेशांशी देवाणघेवाणीचे संबंध होते. उत्खननात सापडलेल्या खालील गोष्टींची यादी पुरेशी बोलकी आहे:-
तांबे (राजस्थान/गुजरात); शंख (गुजरातचा समुद्रकिनारा); सोनं (कोलार/हट्टी खाण?) सर्पंटाईन, अ‍ॅमेझोनईट हे दगड (अनुक्रमे कर्नाटक व गुजरात), हस्तिदंत (कर्नाटक?), इ.इ.
दळणवळणाची साधनं म्हणजे बैलगाड्या आणी होड्या (निदान मोठ्या नद्यांसाठी तरी) हे नक्की आहे. कारण चक्क त्यांची चित्रंच सापडली आहेत मातीच्या भांड्यांवर! शिवाय इनामगावला नदीकाठी एक छोटासा धक्काही मिळाला उत्खननात.
रांजणावर बैलगाडीचे रेखाचित्र
cart.jpg

हे झालं रोजच्या जगण्याबद्दल, पोटाची खळगी भरण्याबद्दल! पण त्यापलिकडे त्यांचं आयुष्य कसं होतं? सुरुवात करूयात त्यांच्या श्रद्धा-समजुतींपासून (इथे 'धार्मिक' हा शब्द मी मुद्दाम टाळलाय - कारण या समाजाचे वैदिक किंवा तत्सम known धर्माशी कुठलेही नाते नाही).
हे लोक मृतांचे दफन करत. ते ही वेगळ्या स्मशानात नव्हे तर घराच्या/ अंगणाच्या जमिनीत खड्डा करून. (फक्त बहाळ या गावाला नदीपल्याड वेगळं स्मशान होतं). मोठ्या (adult) व्यक्तींचे दफन खड्डयात झोपवून केले जाई तर लहान मुलांचे दफन दोन मोठे रांजण तोंडाला तोंड लावून तयार झालेल्या बंद जागेत मृतदेह ठेवून केले जात असे. मोठ्या माणसांचे पाय घोट्यापासून कापले जात ('त्या' जगातून परत इकडे येऊ नये म्हणून?). शिवाय त्याचा/तिचा अनंतातला प्रवास सुखाचा व्हावा यासाठी काही निवडक भांडी (आत कदाचित खाद्यपदार्थ असावेत) त्या दफनात ठेवली जात. शिवाय मृताच्या शरीरावर माळ, बांगड्या इ. अलंकारही असत.

burial.jpg

बाकी त्यांच्या दैवत संकल्पनेविषयी सलग सुस्पष्ट पुरावा नाही. पण विविध प्रकारच्या स्त्री मृण्मूर्ती मिळतात. तेव्हा स्त्रीतत्त्वाची/ सुफलनाची संकल्पना इतर कुठल्याही आदिम समाजाप्रमाणेच इथेही महत्त्वाची असणार यात नवल नाही. शिवाय गुजरात, राजस्थान, माळवा इथल्या ताम्रपाषाणयुगीन समाजांप्रमाणेच इथेही बैलाच्या छोट्या मृण्मूर्ती अनेक मिळाल्यात. बैल कदाचित पुरुषतत्त्वाशी, शेती - समृद्धी या संकल्पनांशी निगडित असावा. इनामगावात एका घराच्या जमिनीखाली एका कच्च्या मातीच्या छोट्या डबीत एक शिरोहीन स्त्री मूर्ती व बैलाची मूर्ती मिळाली. ही निश्चितच कुठल्यातरी धार्मिक विधीशी संबंधित असणार पण आता तो तपशील आपल्यासाठी कायमचाच हरवून गेला आहे. याशिवाय एका मोठ्या रांजणावर एक अर्धा माणूस आणि कमरेखालचा भाग एका वन्य प्राण्याचा (बहुदा बिबळ्या) अशीही एक आकृती आढळते. याचाही संबंध त्यांच्या कुठल्या समजुतीशी असावा असा अभ्यासकांचा कयास आहे.
अग्निपूजेचाही एक पुरावा मिळतो दायमाबादमधे. तिथे काही खड्ड्याच्या स्वरूपातली अग्निकुंडे मिळाली आहेत. आणी त्यात जळालेली गाई-बैलांची हाडे व धान्याचे दाणे सापडले आहेत.

हे लोक मातृसत्ताक होते की पितृसत्ताक हे समजायला मार्ग नाही, पण ज्याला मानववंशशास्त्रात tribal म्हणतात तसे होते. म्हणजे कुटुंब आणि कुल (clan) यांच्या सामाजिक चौकटीतच वावरणारे. उपलब्ध पुराव्यावरून तरी यांच्यात सामाजिक विषमता होती, वर्गभेद होता असं दिसत नाही. शहरीकरणाच्या आधीच्या या संस्कृतीत राज्यसंस्था, राजेपद असंही काही असावं असं दिसत नाही. गावाचा कारभार गावप्रमुख पहायचा. त्याचा दर्जा साहजिकच इतरांपेक्षा थोडा वरचा किंवा वेगळा. इनामगावच्या उत्खननात मिळालेलं गावप्रमुखाचं घर ४-५ खोल्यांचं होतं पण याशिवाय त्या घरातून इतरांपेक्षा वेगळी अशी कुठलीच वस्तू मिळाली नाही. फरक होता तो दफनांमधे. या घरातून मिळालेली दोन पुरुषांची (बहुदा लागोपाठच्या पिढ्यांमधली) दफने ही इतरांसारखी खड्ड्यात झोपवून नव्हे तर ४ पायांच्या साठवणीच्या रांजणाचा वापर खुर्चीसारखा करून त्यात मृतदेहाला मांडी घालून बसवून केली होती. शिवाय या मृतदेहांचे पाय कापण्यात आले नव्हते! आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे गावचं धान्यकोठार या घराच्या मागच्याच बाजूला होतं. बहुदा त्याची देखरेख आणि नियंत्रण हा गावचा प्रमुख करत असावा. (या अशा सामाजिक रचनेला इंग्लिश्मधे chiefdom असं म्हणतात).

chief.jpg

हे असे समाज भारतात इतर प्रदेशातही होते. हळूहळू यांना लोहतंत्रज्ञानाचा शोध लागला आणि इ.स. पूर्व ५-६व्या शतकानंतर येणार्‍या शहरीकरणाकडे त्यांची वाटचाल सुरू झालेली दिसते. अगदी विदर्भातही असाच सांस्कृतिक कालानुक्रम आढळतो. पण दख्खनच्या पठारावर मात्र काही वेगळंच घडलं!
इ.स.पूर्व १२०० -१००० च्या दरम्यान तापी, गोदावरी-प्रवरा खोर्‍यातल्या वसाहती उजाड झाल्या. पुढे अगदी इ.स.पूर्व ३-४थ्या शतकांपर्यंत या भूप्रदेशात मनुष्यवस्तीचा पुरावा संशोधकांना मिळालेला नाही. हे काय गौडबंगाल आहे? याचं उत्तर थोड्याफार प्रमाणात दिलं इनामगावच्या उत्खननाने. तापी, गोदावरी खोर्‍यांमधे न आढळणारी पण फक्त भीमेच्या खोर्‍यातच आढळणारा ताम्रपाषाणयुगाचा शेवटचा कालखंड इथे तपशीलवार अभ्यासला गेला.

अभ्यासकांच्या मते राजस्थानातील पुरापर्यावरणाच्या अभ्यासावरून असं दिसतं इ.स.पूर्व १२००-१००० च्या सुमारास पश्चिम भारतातील हवामान आणखी शुष्क व्हायला सुरुवात झाली. पर्जन्यमान घटलं आणि पाऊस आणखी बेभरवशाचा झाला. वारंवार दुष्काळही पडू लागले असावेत. या सगळ्याचा परिणाम मानवसमूहांवर झाला नसता तरच नवल!

इनामगावचा पुरावा असं दाखवतो की अचानक याच सुमारास लोकांच्या राहणीमानात बदल झाले. चौकोनी घरं सोडून आता हे लोक गोल झोपड्या बांधून राहू लागले. दफनंसुद्धा थोडी घाईगडबडीत उरकली जाऊ लागली. शेतीतही मोठे बदल झाले. गव्हाचं पीक आता कोणी घेइनासं झालं. जव, नाचणी यासारख्या तुलनेने कमी पाण्यात, पटकन होणार्‍या आणि फारसा खटाटोप न करता साठवता येतील अशा पिकांचं प्रमाण खूप वाढलं. जास्त पाणी, चारा लागणार्‍या गाईगुरांची खिल्लारं कमी होऊन शेळ्यामेंढ्यांचं प्रमाण वाढलं. आहारात गोमांस कमी होऊन काळविटाचं मांस हा सगळ्यात महत्त्वाचा घटक ठरला. खापरांवरची नक्षी खूपच कमी झाली आणि त्यांचा पोत खरखरीत झाला. भाजणीही आता तितकीशी उत्तम राहिली नाही. एकूणच रोजच्या जीवनातला तणाव वाढलेला दिसतो. खायचीप्यायची भ्रांतही अधूनमधून पडत असावी कारण एका कुत्र्याचाही समावेश आहारात केल्याचा पुरावा इनामगावात मिळाला आहे.

या सगळ्या पुराव्याचं विश्लेषण करून अभ्यासकांनी असं दाखवून दिलं की इतकी शतकं एक स्थिरस्थावर जीवन जगणारे हे महाराष्ट्राचे आद्य शेतकरी या अस्मानी संकटांशी झगडता झगडता टेकीला आले आणि नाईलाजाने आपल्या उपजीविकेचे मार्ग त्यांनी बदलले.
आजही जिथे अतीव दुष्काळात महाराष्ट्रातील शेतकरी घरदार, खिल्लार सोडून केवळ जगण्यासाठी वाट फुटेल तिथे जातो, वेळप्रसंगी शहरात भीकसुद्धा मागतो, तिथे अशा 'जास्तीच्या' लोकांना सामावून घेणारी शहरीकरणाची आर्थिक यंत्रणा नसताना या शेतकर्‍यांनी तरी काय करावं? मग संस्कृतीचं चक्र 'उलटं' फिरलं! परत एकदा स्थिर शेतीकडून हे लोक अर्ध-भटक्या (semi-nomadic) पशुपालन आणि शिकारीच्या जीवनाकडे वळले.
इनामगावसारख्या गावात कायमचे स्थायिक असलेले लोक जगायला बाहेर पडले आणि मग अधूनमधून काही काळच मुक्कामासाठी परतू लागले. हळूहळू हेही कमी झालं. मग इ.स. पूर्व ८व्या शतकात कधीतरी एकदा गावातून निघालेली कुटुंबं, त्यांच्या पुढच्या पिढ्या कधीच परतून आल्या नाहीत. पोटापाण्यासाठी भटकत कुठे दूर देशी गेले कुणास ठाऊक! त्यांची घरं मात्र तशीच त्यांची वाट पहात राहिली. कायमची.

इनामगावची आणि दख्खनच्या पठारावरच्या आदिम वसाहतींची गोष्ट पुरातत्त्वासाठी इथेच थांबते. पुढे आणखी ४००-५०० वर्षे कुठल्याही वसाहतींचा पुरावा आपल्याला अजून मिळत नाही. मग एकदम सातवाहन कालाच्या थोडं आधीपासून परत एकदा सगळीकडे गावं वसलेली दिसतात. प्रकाश, नेवासा अशा ताम्रपाषाणयुगीन वसाहतीही परत एकदा माणसांच्या वास्तव्याने नव्याने फुलून उठतात. (इनामगाव, दायमाबाद, सोनगाव मात्र परत कधीही कुठल्याही कालखंडात 'जिवंत' झाली नाहीत). सातवाहनांच राजकुल उदयाला येतं आणि दख्खनच्या पठाराचा लिखित इतिहासकाल सुरू होतो.

या ताम्रपाषाणयुगीन लोकसमूहाचे वंशज निश्चितच याही इतिहासकालाचा अविभाज्य भागच असणार. पण आजतरी आपल्यासाठी त्यांची ही ओळख ही एक गुपितच आहे.
कुणी सांगावं? माझ्या आणि माझ्यासारख्याच आणखी काही वेड्या संशोधकांच्या हाताला कधीकाळी तरी यश येईल, आणि मधले दुवे जुळवणारे पुरावे सापडतील. इनामगावची गोष्ट पूर्ण तर केली पहिजे ना.... या जन्मी नाही तरी पुढच्या जन्मी!! 

ताजा कलमः मायबोलीवरच लिहिलेल्या अन्य एका लेखातली माहिती इथे अपडेट करून पुरवणी जोडते आहे - भीमेच्या खोर्‍यातून या अंतकाळाचे फारसे पुरावे हाताला लागले नसले तरी कृष्णेच्या खोर्‍यातील सुपीक, बारमाही पाणी आणि उत्तम पावसाच्या प्रदेशातून (वारणा-मोरणेच्या संगमाजवळ) उत्तर जोर्वेकालीन वसाहती उजेडात आल्या आहेत. त्यामुळे दुष्काळ --> भटके जीवन हे गृहितक सगळ्याच वसाहतींना सरसकट लागू पडते का हा कळीचा प्रश्न परत एकदा ऐरणीवर आला आहे. एकुणातच या अंतकालाचा नव्याने पुरावे शोधून साकल्याने फेरविचार करायची गरज आहे हे माझे मत मला परत एकदा 'पुराव्याने शाबित' करून अधोरेखित करता आले आहे. 

And the Quest goes on....

संदर्भः
वरील लेखात उल्लेखलेल्या सर्व पुरातत्त्वीय स्थळांचे उत्खनन अहवाल
नकाशे आणी प्रकाशचित्रे -उत्खनन अहवाल व 'First Farmers of the Deccan' - M. K. Dhavalikar

https://www.maayboli.com/node/11014

राजापुरची गूढ कातळ-शिल्पे
कोकणात रत्नागिरी व सिंधुदुर्ग या जिल्ह्यांमध्ये कातळशिल्पांचे प्रमाण मोठ्या प्रमाणावर आहे. इंग्रजीमध्ये त्याला पेट्रोग्लिफ असा शब्द आहे.  पेट्रोग्लिफ हा शब्द मूळ ग्रीक शब्दावरून आलेला आहे. ग्रीक भाषेत ‘पेट्रो’ म्हणजे खडक आणि ‘ग्लिफ’ म्हणजे कोरीव काम. खडकावर केलेले कोरीव काम म्हणून ‘पेट्रोग्लिफ’.कातळावर ठरावीक अंतराची चौकट खोदून घेतली जाते आणि त्यामध्ये कातळशिल्पे कोरली जातात. त्यांना उठाव कमी असतो. पावसाळा संपल्यावर गेले तर शिल्पे खास उठून दिसतात. कारण त्याच्या बाजूला गवत उगवलेले असते. कातळशिल्पांमध्ये मासा, कासव, बेडूक असे विविध प्राणी व पक्षी यांच्या आकृती दिसतात. काही भौमितिक रचना दिसतात. एकीकडून पाहिल्यास जहाज, तर दुसऱ्या बाजूने पाहिल्यानंतर दोन वाघांच्या मध्ये असलेला माणूस अशी द्विमितीय चित्रेही तेथे दिसली. वीजवाहक मनोरे आणि त्यांच्या तारा जशा दिसतील तशी काही रचना तेथे भासते. कोकणातल्या जांभा दगडाच्या पठारावर आढळणाऱ्या कातळ शिल्पांचे गूढ कायम असतानाच याच भागातील राजापूरच्या कातळावरही आता तब्बल चौदा चौरस किलोमीटर अंतरावर अनाकलनीय शिल्पे आढळली आहेत . मासे , जलकुंभ , जलसर्प अशा जलस्थानाशी निगडीत शिल्पाकृती या कातळांवर कोरलेल्या आहेत .



कणकवलीजवळ हिवाळ्याचा सडा, निवळी फाट्याजवळ गावडेवाडी, तसेच ऐन निवळी फाटा, भू, भालावल, देवीहसोळ, वेळणेश्वर या ठिकाणी कातळशिल्पे खोदलेली दिसतात. परंतु कोकणात अनेक ठिकाणी त्यांचा आढळ आहे. कातळशिल्पांचे प्रयोजन काय होते? ती कोणी आणि का खोदली? हे अजून न उलगडलेले कोडे आहे. कातळशिल्पांच्या जवळ अंदाजे दोनशे मीटर इतक्या त्रिज्येमध्ये खोल दगडी विहीर आढळते. हा नियम नव्हे, परंतु तशी ती बऱ्याच ठिकाणी आढळते. ही शिल्पे खोदणाऱ्या लोकांसाठी ती सोय केली असावी.
 
      आदिमानवाने विविध शिल्पे कोरून ठेवलेली आहेत. ती कसली चित्रे आहेत, त्यातून काय प्रतीत होते हे सांगणे अवघड आहे. विविध प्राणी, पक्षी अथवा काही अगम्य नक्षीकाम अशी ती खोदचित्रे हे गूढ तर आहेच; शिवाय, ते एक मोठे नवलसुद्धा आहे. मुख्यत्वे लेण्यांच्या भिंतींवर तशा प्रकारचे कोरीव काम केलेले सर्वत्र आढळते. परंतु संपूर्णपणे उघड्यावर असलेल्या कातळावरील ही खोदचित्रे खास करून कोकणातच पाहण्यास मिळतात. ह्या खोदचित्रांचे स्वरूप, त्यांचा आढळ, आणि त्यांच्यासंबंधी स्थानिक लोकांमध्ये प्रचलित असलेल्या विविध दंतकथा...

       रत्नागिरीचे उत्साही संशोधक सुधीर रिसबूड आणि धनंजय मराठे यांनी चिकाटीने त्या खोदचित्रांचा अभ्यास केला आहे. त्यांची एक सूची तयार केली आहे. त्यांच्यामध्ये आढळणारे साम्य आणि विविधता यांचीसुद्धा बारकाईने नोंद केलेली आहे. विशेष म्हणजे त्यांनी त्या विषयात लोकांमध्ये जागृती निर्माण केली आणि स्थानिक लोकांनासुद्धा त्या शोधकार्यात सामावून घेतले. रत्नागिरी जिल्ह्यामधील रत्नागिरी, राजापूर आणि लांजा या तीन तालुक्यांत जवळजवळ दोनशेऐंशीपेक्षा जास्त खोदचित्रे सापडली आहेत. त्यांच्या सोबतच काही देवता, जसे की गोपद्म आणि लज्जागौरी यांचे केलेले अंकन हे आश्चर्यचकित करते.
      प्राण्यांचे आकार हे जिवंत प्राण्याच्या आकाराएवढे खोदलेले दिसतात. काही ठिकाणी हत्ती आणि वाघ यांचे केलेले अंकन अचंबित करते. त्याचा अर्थ ज्या काळात ही चित्रे खोदली गेली त्याकाळात त्या परिसरात हत्ती आणि वाघ हे असणार! मगर, कासव आणि मासे यांची चित्रेसुद्धा आढळतात. स्थानिक लोकांच्या समजुतीनुसार ती खोदचित्रे पांडवांनी वनवासात असताना खोदलेली आहेत. किंवा ती चित्रे तत्कालीन शेतकरी व मेंढपाळ यांनी त्यांच्या पशुधनाच्या रक्षणासाठी खोदली असावीत.
     सर्व खोदचित्रांमध्ये मानवी चित्रांचे अंकन हे तुलनेने जास्त आहे. काही ठिकाणी माणसाचा आकार असून हात हे शरीराला चिकटलेले आहेत. डोके मात्र काहीसे उंच आणि निमुळते दिसते. तो कोणी परग्रहावरील मानव असावा असा सहज भास व्हावा इतके ते चित्र हुबेहूब खोदलेले आहे. काही ठिकाणी योगक्रियेमध्ये असलेल्या षट्चक्रांचे सांकेतिक अंकन केले असावे असे वाटते. तेथे मानवाचा देह फक्त डोक्यापासून कंबरेपर्यंत दाखवला आहे आणि त्यात सहा चक्रे खोदलेली दिसतात. अर्थात तो सगळा समजुतीचा भाग आहे व ते चित्र पाहून केलेला तो केवळ अंदाज आहे.
      पुण्यातील भूगोल अभ्यासक डॉ . श्रीकांत कार्लेकर यांची टीम सध्या यावर अभ्यास करते आहे . कोकणातील भूजलस्रोतांबाबत संशोधन करताना कार्लेकर यांना राजापूरच्या उपळे गावात ही कातळ शिल्पे आढळली . कोकणातल्या जांभा दगडाच्या कातळावर आढळणारी शिल्प हे आजही एक मोठे गूढ आहे . विविध चित्रे आणि अगम्य अशा आकृत्या व नकाशांनी ही शिल्प समृद्ध आहेत . अनेक ठिकाणी रस्ता रुंदीकरणात किंवा नवीन इमारतींच्या बांधकामामुळे अशी दुर्मिळ शिल्पे गायब झाली आहेत . ही चित्रे , नकाशे आणि आकृत्या कोणी आणि कधी काढल्या असाव्यात याची नेमकी कालगणना आज तरी उपलब्ध नाही . काहींच्या मताप्रमाणे ही कातळ चित्रे इसवी सन पूर्व ६००० वर्षे जुनी असावीत , .

    कोकणातील जांभा दगडाचा , विशेषतः कातळ रचनेचा अभ्यास करीत असताना असे आढळले की , इथल्या दुय्यम जांभा पठारावर ती प्रामुख्याने काढली गेली आहेत . देवगड आणि विजयदुर्ग येथील सडा हा जांभ्याचे आदर्श असे कातळ आहे असे मानण्यात येते . मात्र , रत्नागिरी जिल्ह्यातील राजापूर तालुक्यातला कातळ सडा हा निसर्गाचा एक विलक्षण आविष्कारच आहे . येथील कातळाची जाडी २५ मीटरपेक्षा जास्त असून , भूजल साठेही खूप खोल आहेत . राजापूरच्या कातळावर जुवाठी - उपळे - प्रिंदावण या त्रिकोणात उपळे गावाच्या सीमेवर आम्हाला चौदा चौरस किलोमीट कातळावर अनाकलनीय शिल्प आढळली आहेत . मासे , जलकुंभ , पाण्यातील साप अशा जलस्थानाशी निगडीत चित्रविचित्र शिल्पाकृती यावर काढल्या आहेत . मे महिन्यात कातळावरचे सगळे गवत नाहीसे झाल्यावर त्यावर जलस्थानांशी संबंधित आकार दिसतात , असे स्थानिक नागरिक सांगतात . शास्त्रीय पद्धतीने या प्रदेशातील कातळ चित्रांचा मागोवा घेणे गरजेचे आहे ,
       रत्नागिरी जिल्ह्याच्या राजापूर तालुक्यात एकेकाळी बंदर असलेल्या बारसू या गावातील मोठ्या डोंगरावर असलेलीकोरीव चित्रे ऐतिहासिक अभ्यासकांना व संशोधकांना आजवर एक आव्हान ठरली आहेत . ही चित्रे प्रत्यक्ष पाहतानाती कोणत्या तरी धार्मिक कारणासाठी काढलेली असावीत असेच वाटते . मात्र ती चित्रे कोणी आणि कधी कोरली यासंदर्भातील शोध अद्यापही लागलेला नाही . रत्नागिरीनजिकच्या नाचणे या गावीही अशाच प्रकारचे जांभादगडावर कोरलेले नौकेचे चित्र पहावयाला मिळते .
     गावडेवाडी आणि निवळीफाटा येथे भौमितिक रचना खोदलेल्या दिसतात. तशा रचनांना चारही बाजूंनी आधी चौकट खोदलेली आहे. त्या चौकटींच्या आतमधे विविध भौमितिक आकार आहेत. त्यांचे प्रयोजन अनाकलनीय आहे. विद्युत मंडळाच्या तारा जशा गावोगावी आढळतात तशा प्रकारचे नक्षीकाम त्या ठिकाणी केलेले दिसते. चौकोन, त्रिकोण, उभ्या आणि आडव्या समांतर रेषा, सापाची नक्षी अशा प्रकारचे विविध आकार त्या एकाच चौकटीत खोदलेले आढळतात.
      सर्व कातळशिल्पांमध्ये अत्यंत देखणे शिल्प हे राजापूरजवळ बारसू गावी असलेल्या तारव्याचा सडा येथे पाहण्यास मिळते. राजापूरपासून देवाचे गोठणेला जाऊ लागले, की दहा किलोमीटरवर बारसू/बारसव गाव लागते. तेथून डावीकडे जाणारा रस्ता आहे. त्या रस्त्याने अंदाजे दीड किलोमीटर गेले, की अंदाजे पन्नास फूट लांब आणि वीस फूट रुंद अशी काळ्या खडकावर खोदचित्र चौकट दिसते. तेथे खडकात दोन वाघ एकमेकांसमोर उभे आहेत आणि त्यांच्या मध्येच एक मानवी आकृती त्या दोन वाघांना थोपवून धरत आहे असे चित्र खोदलेले आहे. पण खरे आश्चर्य पुढेच आहे. तेच चित्र जर विरुद्ध बाजूने समोर जाऊन पाहिले तर एक मोठे गलबत समुद्रातून चाललेले दिसते. त्याला शिडे आहेत आणि खाली पाण्याच्या लाटा हलत आहेत, पाण्यात विविध मासे पोहत आहेत असे सर्व दाखवले आहे. दोन वाघांच्या मध्ये जी मानवी आकृती कोरलेली दिसते तिच्या छातीवर लज्जागौरीचे चिन्ह अगदी ठसठशीतपणे जाणवते. ते धार्मिक विधीचे शिल्पांकन असेल का? किंवा ते ठिकाण कोठल्या देवतेचे स्थान असेल का? सगळा तर्काचा भाग, परंतु इतके सुंदर, इतके अद्भुत आणि आखीवरेखीव चित्र पाहून प्रेक्षक थक्क होतो. तसेच एक चित्र गणपतीपुळ्याला जाणाऱ्या निवळी फाट्यावर होते. परंतु रस्तारुंदीकरणात ते निम्म्याहून अधिक संपले आहे! तो अगदी दुर्मीळ असा ठेवा आहे.
 मराठे यांनी स्थानिक आमदारांच्  या मार्फत विधिमंडळात सुद्धा तो प्रश्न उपस्थित केलेला आहे. राज्य सरकारकडून अशा कातळशिल्पांसाठी काही निधी राखून ठेवला गेला आहे. ते दोघे खेड्यापाड्यांत जाऊन शाळांमध्ये मुलांना व्याख्यान देतात आणि त्यांच्या त्यांच्या परिसरात तसा काही ठेवा असल्यास तो शोधण्यास सांगतात. आश्चर्य म्हणजे गुहागर तालुक्यातील शाळेच्या पटांगणातच तसे कातळशिल्प आढळून आले!
    राजापूर-आडिवरे रस्त्यावर सोलगाव फाटा आहे. तेथून आत दहा किलोमीटरवर देवाचे गोठणे नावाचे गाव आहे. त्या गावी भार्गवरामाचे सुरेख मंदिर आहे. थोरल्या बाजीराव पेशव्यांनी ते गाव ब्रह्मेंद्रस्वामींना आंदण दिले होते. त्या गावात असलेल्या भार्गवराम मंदिरात एक सुंदर पोर्तुगीज घंटा टांगलेली आहे. मंदिराच्या समोर एक पायवाट डोंगरावर जाते. डोंगरावर गेले, की काही अंतर उजवीकडे चालून गेल्यावर एक आश्चर्य सामोरे येते. तेही कातळशिल्पच आहे. तेथे एक मानवी आकृती कोरलेली आहे. पण आश्चर्य असे, की त्या मानवी आकृतीच्या पोटावर जर होकायंत्र ठेवले तर ते चुकीची दिशा दाखवते! त्या आकृतीमध्ये काही चुंबकीय क्षेत्र तयार होते आणि होकायंत्र चुकीची दिशा दाखवते. तो चौकोन अंदाजे वीस चौरस फूट लांबीरुंदीचा आहे. तेथे कोठेही होकायंत्र नेले तरीसुद्धा दिशा चुकीची दिसते. कातळशिल्प खोदताना त्या मंडळींना याची माहिती होती हे तर नक्कीच. मग त्याच ठिकाणी असे का खोदले गेले असेल? वर्तमानकाळात प्रसिद्ध असलेली चुंबकीय चिकित्सा त्याकाळी ज्ञात होती का ? त्यासाठीच झोपलेल्या मानवाची ही आकृती आणि तेथे होकायंत्राची गडबड यांचा काही संबंध असेल का? मुळात त्या काळी होकायंत्रे होती का? हे सगळे प्रश्न येथे प्रेक्षकाला भंडावून सोडतात. परंतु त्या खोदचित्रामागे काहीना काही संकेत नक्की आहेत. त्या कातळशिल्पाच्या जवळ विहीर नाही, मात्र पाण्याचे छोटे कुंड आहे. संशोधकांना तेथे मोठे भुयार सापडले आहे. बाहेरून तरी ते खूप खोलवर गेलेले दिसते. त्याचा शोध घेण्याचे काम तेथे पावसाळ्यानंतर शास्त्रोक्त पद्धतीने हाती घेण्यात येणार आहे.
      दुसरे एक सुंदर कातळशिल्प आहे देवीहसोळ या गावी. राजापूरच्या पुढे असलेल्या ‘भू’ या एकाक्षरी नाव असलेल्या गावापासून नऊ किलोमीटर अंतरावर देवीहसोळ हे गाव येते. तेथे आर्यादुर्गा देवीचे सुंदर मंदिर आहे. कऱ्हाडे ब्राह्मण कुटुंबांची ती कुलदेवता आहे. त्या मंदिराच्या अलिकडे व मंदिराला लागून रस्त्याच्या डाव्या हाताला अंदाजे पंधरा चौरस फुटांची चौकट आखलेली दिसते. त्या चौकटीला चारही बाजूंनी साखळ्या लावून संरक्षित केलेले आहे. चौकटीच्या आत सुरुवातीला सर्पाकार आकृती आहेत. चौकटीचे चार भाग केलेले दिसतात. त्या चार भागांमध्ये विविध आकृती कोरलेल्या आहेत. त्यांतील काही समजतात, काही अनाकलनीय आहेत. चौकटीच्या मध्यभागी गोल खोलगट खड्डा आहे. त्यात पाणी साठलेले असते. देवीहसोळच्या जवळ भालावली नावाचे गाव आहे. त्या गावात नवदुर्गेचे मंदिर आहे. देवीहसोळच्या आर्यादुर्गेचा उत्सव मार्गशीर्ष वद्य अष्टमीला असतो. त्यावेळी भालावलीहून नवदुर्गेची पालखी त्या देवीच्या भेटीला येते. त्या दोन गावच्या दोन देवींची भेट त्यावेळी कातळशिल्पावर होते, हे एक नवल म्हणायला हवे! त्या भेटीच्या वेळी कातळशिल्पाच्या मधोमध असलेल्या खोलगट भागात फुरसे नावाचा विषारी साप येतो आणि तो तेथेच दिवसभर बसून असतो असे स्थानिक सांगतात. त्या कातळशिल्पापासून देवीच्या मंदिरापर्यंत शंभर मीटर अंतर आहे. तेथे सर्वत्र विविध कातळशिल्पे खोदलेली दिसतात. त्यामध्ये हत्ती, मासा यांसारखे प्राणी प्रामुख्याने आढळतात. काही कातळशिल्पे कोरताना अर्धवट सोडलेली आहेत; मात्र बरीचशी सुस्पष्ट अशी खोदलेली आहेत.
     त्या कातळशिल्पांपासून जेमतेम दोनशे मीटर अंतरावर कातळात खोदलेली मोठी विहीर बघण्यासारखी आहे. अंदाजे चाळीस फूट खोल विहिरीला उतरण्यासाठी एका बाजूने पायऱ्या खोदलेल्या आहेत. कातळशिल्पाशेजारी विहीर हे सूत्र तेथे तरी पाहण्यास मिळते.
 आशुतोष बापट ८६०५०१८०२०
सुधीर रिसबूड ९४२२३७२०२०

 उक्षीतील कातळशिल्प
 इंग्रजी भाषेत जी ‘रॉक आर्ट’ म्हणून ओळखली जाते तिला मराठीत ‘कातळ खोदशिल्प’ असे म्हटले जाते. याचे शास्त्रीय नाव ‘पेट्रोग्लिफ्स’ असे आहे. ग्रीक भाषेतला हा शब्द असल्याने ग्रीक भाषेत पेटाचा अर्थ पाषाण आणि ग्लिफीन म्हणजे कोरणे असा आहे. निसर्गातल्या पाषाणावर मानवाने कोरलेल्या खुणा म्हणजे ‘पेट्रोग्लिफ्स’ होय. सर्वसाधारणपणे अशी शिल्प ही गुहेच्या भिंंतीवर किंवा उभ्या पाषणाच्या पृष्ठभागावर कोरली जातात.

परंतु, कोकणात ती आकाशाच्या छताखाली, कातळावर कोरली गेली आहेत. मानवाच्या कलात्मक उत्क्रांतीचा प्राथमिक टप्पा म्हणून या शिल्परचनेकडे पाहिले जाते. इसवी सन पूर्व ३५ हजार ते दहा हजार वर्षांपूर्वीचे शिल्प असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे.
 
२० फूट लांब व १६ फूट रूंदीचे हत्तीचे शिल्प कोरण्यात आले आहे. या शिल्पाच्या निकट तसेच शेजारच्या गावातही काही कोरीव कातळ शिल्प आढळली आहेत. प्राचीन कलेचा उत्कृष्ट नमुना या शिल्पाव्दारे लोकांसमोर येत आहे. अनुप सुर्वे यांच्या जागेमध्ये हे हत्तीचे शिल्प आढळले. त्यांनी विनामोबदला ही जागा उपलब्ध करून दिली. तसेच जवळच काशिनाथ देसाई यांच्या जागेमध्ये सुमारे पंधरा खोदशिल्पे आहेत. 


 विविध प्राणी, पक्षी, सुंदर नक्षीकाम असलेली ही खोदचित्रे गूढ आहेत. रत्नागिरी जिल्ह्यात सापडलेली ही कातळशिल्प नजरेस पडल्यानंतर त्याबाबतचे कुतूहल अधिक वाढले. रत्नागिरी जिल्ह्यातील ५२ गावांमध्ये कातळशिल्पे सापडली आहेत. रत्नागिरी जिल्ह्यातील रत्नागिरी, लांजा, राजापूर परिसरात एक हजारपेक्षा अधिक कातळशिल्पे असून, या प्रत्येक रचना भिन्न आहेत. मंडणगड व गुहागर तालुक्यातही कातळशिल्पे सापडली आहेत. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील देवगड तालुक्यातही काही रचना सापडल्या आहेत.
कातळशिल्पांची ठिकाणे
रत्नागिरी तालुका - जयगड, चवे, रामरोड, करबुडे, मासेबाव, निवळी, गोळप, निवळी - गावडेवाडी, कापडगाव, उमरे, कुरतडे, कोळंबे, गणेशगुळे, मेर्वी, गावखडी, डोर्ले. राजापूर तालुका - देवाचेगोठणे, सोगमवाडी, गोवळ, उपळे, साखरेकोंब, विखारेगोठणे, बारसू, पन्हाळे, शेडे, कोतापूर, देवीहसोळ. लांजा तालुका - भडे, हर्चे, रूण, खानावली, रावारी, लावगण
    कोकणचा इतिहास उलगडणाऱ्या या खोदशिल्पांना राज्य संरक्षित करण्याचा प्रयत्न सुरू आहे. सध्या लोकसहभागातून या कातळ खोदशिल्पाला संरक्षक कठडा बांधलेला आहे. त्याशेजारी चबुतरा बांधला असून, त्यावरून कातळशिल्प व्यवस्थित दिसू शकते.. त्यामुळे उक्षी गावात पर्यटनाचा नवा अध्याय सुरू होईल. उक्षीमध्ये पावसाळ्यात धबधबा पाहण्यासाठीही गर्दी होते. त्यासोबत कातळशिल्पे पाहण्याची संधी पर्यटकांना मिळणार आहे.
कसे जायचे?
हत्तीचे हे खोदशिल्प उक्षी गावातील प्रसिद्ध धबधब्यापासून केवळ दोन किलोमीटर अंतरावर आहे. हे ठिकाण मुंबई-गोवा महामार्गापासून २५ किलोमीटर, तर रत्नागिरी शहरातून ते ४० किलोमीटर अंतरावर आहे. कोकण रेल्वेचे स्थानकही उक्षी गावात असल्याने बाहेरील पर्यटकांनाही येथे जाणे शक्य आहे.

देवाचे गोठणे : श्रीमंत थोरल्या बाजीराव पेशव्यांनी गुरू श्रीब्रह्मेंद्रस्वामी यांना हे गाव हे गाव इनाम म्हणून दिले होते. सन १७१०-११साली देवाचे गोठणे येथे स्वामी वास्तव्याला आले. त्यांनी या गावात असलेल्या श्री गोवर्धनेश्वर मंदिराचा जीर्णोद्धार केला आणि याच मंदिरात परशुरामाच्या मूर्तीची प्रतिष्ठापना केली. अंदाजे दोन फूट उंचीची तांब्याची ही मूर्ती दोन्ही हात जोडलेल्या स्थितीत आहे. दुसरे महत्त्वाचे म्हणजे मंदिराच्या मागे असलेल्या दगडी मार्गाने माथ्यावर गेले, की एक अप्रतिम कातळशिल्प आवर्जून पाहण्याजोगे आहे. इथल्या खडकामध्ये चुंबकीय क्षेत्र असल्यामुळे होकायंत्र ठेवले असता ते चुकीची दिशा दाखवते.


९०,००० वर्षापूर्वी आदिमानवाचे वास्तव्य असलेली गुहा, सुसरोंडी, पालशेत, तालुका :- गुहागर ( Acheulian cave at Susrondi, Palshet, Taluka Guhagar)
 https://samantfort.blogspot.com/2023/01/acheulian-cave-at-sursondi-palshet.html

 


Acheulian cave at Susrondi

रत्नागिरी जिल्ह्यातील गुहागर तालुक्यात पालशेत नावाचे प्राचीन गाव आहे. पेरिप्लस ऑफ़ दि एरिथ्रियन (Periplus of the Erythraean Sea) या इसवीसनाच्या पहिल्या शतकात एका ग्रीक खलाशाने लिहिलेल्या पुस्तकात कोकण किनारपट्टीतील काही बंदरांचा उल्लेख आहे. त्यात ‘पालमपट्टई’  नावाच्या बंदराचा उल्लेख आहे. हे बंदर म्हणजे आजचे पालशेत असावे असे काही तज्ञांचे मत आहे.  या बंदरातून ग्रीस आणि रोम यांच्याशी व्यापार तिसऱ्या शतका दरम्यान चालत होता. पालशेत गावतील लक्ष्मी नारायण मंदिराजवळ आजही मध्ययुगीन बंदराचे अवशेष पाहायला मिळतात.


आदिमानवाचे वास्तव्य असलेली गुहा, पालशेत

पालशेत गावातील सुसरोंडी  भागात अंदाजे ९०, ००० वर्षापूर्वी आदिमानवाचे वास्तव्य असलेली गुहा सापडलेली आहे. याशिवाय या भागात मांडवकरवाडी (पालशेत), चिंद्रावळे (हेदवी-नरवण) इत्यादी अनेक गुहा विखुरलेल्या आहेत. या गुहांमुळे या भागाला गुहागर ("गुहाचे आगार" या अर्थी ) असे नाव पडले असावे. भारताला लाभलेल्या ७५०० किलोमीटर समुद्र किनाऱ्यापैकी आत्तापर्यंत केवळ गुहागर तालुक्यातील समुद्रकिनाऱ्या जवळच्या २५ ते ३० किलोमीटरच्या पट्ट्यात आदिमानवाचे वास्तव्य असलेल्या गुहा सापडलेल्या आहेत.  भारतात आदिमानवाचे वास्तव्य असलेल्या गुहा यापूर्वी डोंगरावर किंवा पठारी भागात सापडलेल्या आहेत. त्यामुळे या परिसरातील गुहांचे महत्व अधोरेखित होते.

डेक्कन कॉलेजचे डॉ. अशोक मराठे यांनी २००१ मध्ये या गुहेमध्ये उत्खनन केले होते. त्यावेळी या गुहा त्यांना ज्यांनी दाखवल्या त्या ओक काकांनी आमच्या बरोबर गुहा दाखवायला यायचं मान्य केलं. ओक काका मुळचे पालशेत गावाचे.  लहानपणापासून त्यांनी पालशेतच्या आजूबाजूचे जंगल तुडवल आहे. आजही ते आपला व्यवसाय सांभळून जंगलातून भटकंती करत असतात. जंगलावर आणि इथल्या ऐतिहासिक गोष्टींवर त्यांचे नितांत प्रेम आहे. आम्हाला केवळ गुहा  दाखवायला आलेले ओक काका आमचे या विषयातील स्वारस्य बघून पालशेत आणि आजूबाजूच्या परिसरातील ऐतिहासिक वाटा, बारव, मंदिर या गोष्टी दाखवत दिवसभर फिरले.


Acheulian cave at Susrondi, Map by Mahendra Govekar

पालशेत गावातून एक रस्ता पोमेंडी गावाकडे जातो. या रस्त्यावर बौद्धवाडी (बारभाई) आहे. या बौद्धवाडीतून  एक प्राचीन वाट सुसरोंडीच्या सड्यावर जाते. चिर्‍यांनी बांधलेल्या चढाईच्या वाटेला कोकणात घाटी म्हणतात. दोन्ही बाजूला चिर्‍यांच्या गडग्यांचे कुंपण केलेल्या आंब्या-काजूच्या बागा होत्या. त्याच्या दाट सावलीतून चढत जाणाऱ्या वाटेने १५ मिनिटात एका फाट्यावर येतो. येथून उजव्या बाजूची वाट दाट जंगलातून जाते. जानेवारी महिना असल्याने या वाटेवर असलेल्या अनेक झाडांचे मोहोर फ़ुलले होते त्याचा गोडूस धुंद सुवास आसमंतात भरुन राहीला. खुरीची पांढरी फ़ुले आणि अंजनाची जांभळी फ़ुले घोसाने फ़ुलली होती. त्यांचा दरवळ वातावरण सुगंधित करत होता.  या वाटेने  १० मिनिटे चढाई केल्यावर आम्ही सुसरोंडीच्या सड्यावर पोहोचलो.  खाली दुरवर दाट झाडीत लपलेली मांडवकरवाडीतली लाल कौलांची घर दिसत होती. त्या वाडीतही आदिमानव कालिन गुहा आहेत.


खुरीची फुलं

अंजन
सुसरोंडीचा  सडा उभा आडवा पसरलेला आहे. सड्यावर  लक्षात ठेवण्यासारखी कुठलीही खूण नाही. लोकांचा वावर नसल्याने मळलेल्या वाटा नाहीत. त्यामुळे गुहा बघायला जायचे असेल तर  गावातून माहीतगार सोबत असणे आवश्यक आहे. आमच्या बरोबर आलेले ओक काका लॉकडाऊन नंतर पहिल्यांदाच इथे येत होते. त्यामुळे त्यांनाही थोडी शोधाशोध करावी लागली, पण ते येथे अनेकदा येऊन गेल्यामुळे त्यांना दिशेचा अंदाज होता. त्या दिशेने थोडी शोधाशोध केल्यावर वाट सापडली. या वाटने  खाली उतरताना जांभ्या दगडात कोरलेल्या काही  पायाऱ्या लागल्या. पायाऱ्या उतरल्यावर एक ओढा  लागला. हा ओढा पुढे सुंदरी नदीला जाउन मिळतो. ओढा ओलांडून  पलीकडे  जाऊन पाण्याच्या प्रवाहाच्या दिशेने थोडे चालून गेल्यावर प्रवाह एका कड्यावरून  १५ ते २० फूट खाली उडी मारतो. पावसाळ्यात या ठिकाणी ७ धारा असलेला धबधबा पडतो. पण पावसाळ्यांत पाण्याच्या प्रवाहामुळे या ठिकाणी येणे धोकादायक आहे.


धबधबा आणि उजवीकडे गुहा

धबधब्याच्या कड्यावरून उजव्या बाजूला गुहेच तोंड दिसत होतो. या भागात माणसांचा वावर नसल्यामुळे जंगली प्राणी गुहेत असण्याची शक्यता होती. ओक काकांनी जवळचे धोंडे उचलून गुहेच्या दिशेने  फेकायला सुरुवात केली. आम्हालाही हाकारे घालायला सांगितले. त्यानंतर पाच मिनिटे वाट बघितली. गुहेत एखाद जंगली जनावर असेल तर त्याला बाहेर जाण्याची संधी मिळावी हा त्यामागे हेतू होता. थोडा वेळ थांबूनही गुहे जवळ काही हालचाल जाणवली नाही.  मग आम्ही धबधब्याच्या बाजूने खाली उतरायला सुरुवात केली. याठिकाणीही जांभ्या दगडात  कोरलेल्या पायाऱ्या पाहायला मिळाल्या.  प्रवाह ओलांडून धबधब्या जवळ पोहोचलो. पाण्याच्या प्रवाहामुळे धबधब्याच्या खाली खोल डोह तयार झाला होता. आजूबाजूच्या वृक्षाची मुळे धबधब्याच्या कातळ भिंतीवरून खाली उतरलेली होती. डोहातल्या  गर्द हिरव्या पाण्यात  त्याचं प्रतिबिंब पडलं होत. बालकवींची औदुंबर कविता आठवली.




पाण्यात पाय सोडून बसलेली झाडं 

ऐल तटावर पैल तटावर हिरवाळी घेऊन , निळासावळा झरा वाहतो बेटाबेटातून

चार घरांचे गाव चिमुकले पैल टेकडीकडे, शेतमळ्यांची दाट लागली हिरवी गर्दी पुढे

पायवाट पांढरी तयातुन अडवीतिडवी पडे, हिरव्या कुरणामधून चालली काळ्या डोहाकडे

झाकळुनी जळ गोड काळिमा पसरे लाटांवर, पाय टाकूनी जळात बसला असला औदुंबर

इथे पाण्यात पाय सोडून बसलेला औदुंबर नसला तरी बालकवींनी वर्णन केलेले निसर्गदृश्य पाहात पाहातच आम्ही गुहेपर्यंत पोहोचलो होतो.


आदिमानवाचे वास्तव्य असलेल्या गुहेचे तोंड 
         
ओक काका इसवीसन २००१ साली डॉ मराठे यांना इथे घेऊन आले तेंव्हा गुहेचे तोंड झाडी झूडूपांनी झाकलेले होते. गुहेत कोणी असेल तर बाहेर यावे यासाठी त्यांनी सोबत आणलेले फटाके गुहेच्या तोंडावर वरून टाकले. त्यांनतर सोबत आलेल्या एका कातकऱ्याला दोर बांधून गुहेच्या तोंडा जवळ उतरवले. त्याने झाडी झुडपे तोडून गुहेत प्रवेश केला. गुहेच्या भिंतींवर, छतावर त्यावेळी पाली आणि कोळ्यांचे राज्य होते. मशाली पेटवून आगीचा धाक दाखवून त्यांना पळवून लावण्यात आले. प्राथमिक शोध घेतांना या गुहेच्या जवळ अश्मयुगीन परशु / फ़रशी (Cleavers) सापडले. त्यामुळे त्यांनी सुसरोंडी येथे उत्खनन करण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर काही दिवसात सध्या गुहेजवळ जाण्याचा मार्ग आहे तो बनवला. 


Entrance of Susrondi cave (from inside)
 जांभा दगडात बनलेल्या गुहेच्या तोंडातून आम्ही आत प्रवेश केला. कोकणात सर्वत्र दिसणारा लाल रंगाचा जांभा दगड हा ज्वालामुखीजन्य काळ्या पाषाणापासून म्हणजेच बेसॉल्ट पासून बनलेला आहे. लाखो वर्षे मंदगतीने बेसॉल्ट खडकाची झीज दोन प्रकारे होत असते.  १) भौतिक विच्छेदन (Physical disintegration) आणि २) रासायनिक विघटन (Chemical Decomposition). भौतिक विच्छेदनामुळे खडकाचे तुकडे  होतात  तर रासायनिक विघटनामुळे पाण्यात विरघळणारे आणि पाण्यात न विरघळणारे असे दोन प्रकारचे पदार्थ तयार होतात. पाण्यात विरघळणारे पदार्थ पावसाच्या पाण्याबरोबर वाहून जातात त्यामुळे दगड जाळीदार होतो आणि न विरघळणारे पदार्थ मागे राहातात. त्यातील लोहाच्या ऑक्साईडमुळे जांभा दगडाला तांबडा रंग येतो. कोकणात दिवस आणि रात्रीच्या तापमानात असलेला फ़रक आणि पावसाचे प्रमाण जास्त असल्याने काळ्या पाषाणाचे भौतिक विच्छेदन  आणि रासायनिक विघटन परिणामकारकरित्या होऊन जांभा दगड तयार झाला आहे.  सुसरोंडीच्या गुहेची निर्मिती अशाच प्रकारे जांभ्या दगडाचे भौतिक विच्छेदन  आणि रासायनिक विघटन होऊन झालेली आहे.

गुहेच तोंड १.५ मीटर रुंद आणि २.५ मीटर  उंच आहे. गुहेत प्रवेश केल्यावर आतील भाग ५ मीटर लांब आणि ४ मीटर रुंद आहे. येथून गुहेत पूर्वेला आणि उत्तरेला जाणाऱ्या दोन वाटा फुटल्या आहेत . या वाटाची उंची जेमतेम २ मीटर आहे. त्यात सध्या वाटवाघुळांचे वास्तव्य असल्याने आत  जाता येत नाही. यातील उत्तरेकडील वाट लांबवर जाते असे स्थानिक लोक सांगतात. गुहेत आदिमानवाच्या अस्तित्वाच्या खुणा शोधाण्यासाठी डॉ मराठे यांनी गुहेच्या तोंडाजवळ ३ मीटर लांब   २ मीटर रुंद आणि ४.२ मीटर  खोल खड्डा (Trench) घेतला. या उत्खननात विविध स्तरावर (खोलीवर ) त्यांना आदिमानवाने वापरेली २२ दगडी हत्यारे सापडली. त्या हत्यारांच्या  जडणघडणी वरून त्याचा काळ निश्चित करता येतो. त्यावरून साधारणपणे ९0000 वर्षांपासून याठिकाणी मानवाचे वास्तव्य होते असे दिसून आले.

मानवाच्या इतिहासाचा लाखो  वर्षाचा काळ दोन भागात विभागला जातो . प्रागैतिहासिक काळ (Prehistory) आणि ऐतिहासिक काळ (History). माणसाला लिहिण्याची कला अवगत झाली त्याच्या पुढच्या काळाला ऐतिहासिक काळ म्हणतात. हा जेमतेम ५००० वर्षाचा काळ आहे. त्या आधीचा लाखो वर्षाचा काळ म्हणजे प्रागैतिहासिक काळ. या काळात मानव समुहाने राहात होता. तो भटक्या होता तरी उन, वारा पाऊस यांच्या पासून संरक्षण मिळवण्यासाठी तो नैसर्गिक गुहांचा आश्रय घेत होता.  कंदमुळे, फ़ळे गोळा करणे, शिकार करणे इत्यादीसाठी त्याने निसर्गात उपलब्ध असलेल्या दगडाचाच हत्यार म्हणूम वापर केला. सुरुवातीच्या काळात दगडाचे मोठे कपचे काढून ओबडधोबड हत्यारे बनवली जात. त्यांना Abbevillian tools म्हणून ओळखले जाते. काळानुरुप हत्यारात सुधारणा होऊन  ती प्रमाणबध्द , सुबक, धारदार आणि आकाराने छोटी झाली. त्यांना Acheulean tools म्हणून ओळखले जाते. त्यापुढील काळात लाकडात किंवा हाडामध्ये दगडी पाती अडकवून त्याने हत्यारे बनवली अशा हत्यारांना  Composite tools म्हणून ओळखले जाते. 


Paleolithic Age

लाखो वर्षाचा प्रागैतिहासिक काळ ३ भागात विभागलेला आहे.

१) पुराश्मयुग (Paleolithic Age)

अ)पूर्व पुराश्मयुग - १० लाख ते १ लाख वर्षे  (Lower Paleolithic Age)

ब) मध्य पुराश्मयुग - १.२५ लाख ते २५ हजार वर्षे (Middle Paleolithic Age)

क) उत्तर पुराश्मयुग - ३५ हजार ते १० हजारवर्षे (Upper Paleolithic Age)

या काळात मानव मुख्यत: अन्न संकलन आणि भटके जीवन जगत होता.

२) मध्याश्मयुग (Mesolithic Age) - १२ हजार ते ५ हजार वर्षे  , याकाळात पशुपालन व शेती करुन मानव अन्न उत्पादन करु लागला. 

३) नवाश्मयुग (Neolithic Age) - ४ हजार ते २५०० वर्षे , याकाळात मानव स्थिर जीवन जगू लागला.


Paleolithic Tools


Acheulian Stone tools found in cave at Susrondi Courtesy :-Paper published by Dr Marathe 

सुसरोंडीच्या गुहेत केलेल्या उत्खननात सापडलेली दगडी हत्यारे बेसॉल्ट दगडापासून बनवलेली होती. यात ३ हातकुर्‍हाड (Hand Axe) २ अश्म परशु / फ़रशी (Cleavers) , ४ कुदळ (Picks), १४ चाकू (Choppers), २४ तासणी (सोलणी) (Scrappers) ही हत्यारे सापडली. ही हत्यारे बनवण्यासाठी वापरण्यात आलेले दगड (Cores) आणि त्या दगडापासून हत्यारे बनवताना उडालेल्या ढलप्या (Flakes) ही याठिकाणी सापडल्या आहेत. इथे आणि वेळणेश्वर येथे केलेल्या उत्खननात सापडलेल्या मातीच्या नमुन्यांवरुन काही हजार वर्षांपूर्वी समुद्राची पातळी आजच्या पेक्षा बरीच वर होती. त्यामुळे कंदमुळे, शिकार करुन अन्नसंकलन करणार्‍या आदिमानवाला समुद्रातूनही अन्न मिळत होते. जवळपासच्या भागात असलेल्या अन्नाच्या उपलब्धतेमुळे आणि गुहे जवळच असलेल्या गोड्या पाण्याच्या ओढ्यामुळे आदिमानवाने या गुहेचा आश्रय घेतला होता.


आदिमानवाच्या गुहेत बसून पुरातत्वशास्त्राच्या (Archaeology) अभ्यासक्रमात शिकलेला लाखो वर्षाचा मानवी इतिहास मी सगळ्यांना सांगितल्यावर शांतता पसरली. गुहेतल्या आदिम शांततेत आमच्याच श्वासाचा आवाज आम्हाला ऐकू येत होता. गुहेतून बाहेर पडून ओढ्याच्या काठाने प्रवाहाच्या दिशेने पुढे गेल्यावर एक छोटा धबधबा आणि त्याखाली असलेला डोह पाहायला मिळतो.

गुहा पाहायला आलेल्या वाटेने न उतरता दुसर्‍या वाटेने खाली उतरुन गावातील लक्ष्मी नारायण मंदिर गाठले. मंदिरा जवळ एक जांभ्या दगडात बांधलेली इंग्रजी 'L" अक्षराच्या आकाराची बारव आहे.. याच आवारात असलेल्या शिवमंदिरातील काळ्या पाषाणातील गणपतीची आणि नंदीची मुर्ती सुंदर आहे. मंदिराच्या पुढे पालशेतच्या प्राचीन बंदराचे अवशेष आहेत. या ठिकाणी ४ बुरुज आणि खाली उतरण्यासाठी पायर्‍या बांधलेल्या आहेत. या ठिकाणी केलेल्या उत्खननात नांगर आणि बोटी बांधण्याचा लोखंडी कड्या सापडल्या होत्या. या बुरुजांच्या काटकोनात एक ४ फ़ूट उंच भिंत आहे. त्याला ठराविक अंतरावर कमान असलेले दरवाजे आहेत. भरती ओहोटीचे पाणी बंदरात नियंत्रित करण्यासाठी Lock gates असतात तशी योजना येथे केलेली असावी. या भागात आता जंगल आणि बागायती असल्याने संपूर्ण परिसर पाहाता येत नाही. याशिवाय गावात प्राचीन वाट आणि त्यावरील अंतर दाखवणारे कोसाचे (मैलाचे) दगड   हे प्राचीन अवशेष पाहायला मिळाले. 


Lock Gates in Ancient Palshet dock 


Mile stone on ancient route at Palshet

हिच प्राचीन वाट पुढे पालशेत - वेळणेश्वर रस्त्यावर असलेल्या अडूर गावाच्या सड्यावर जाते. त्यावर असलेले कोसाचे दगड , पांथस्थांसाठी बांधलेली बारव आणि विश्रांतीसाठी पुरातन वृक्षांच्या भोवती बांधलेले पार पाहून आजच्या दिवसाची ऐतिहासिक सफ़र पुर्ण केली.


Step well, Adur
जाण्यासाठी :-

चिपळूण पासून पालशेत गाव ४५ किलोमीटर अंतरावर आहे. चिपळूणहून थेट पालशेतला जाण्यासाठी फ़ार कमी एसटीच्या बसेस आहेत. त्यामुळे चिपळुणहून दर अर्ध्या तासाला सुटणार्‍या चिपळूण - गुहागर एसटीने शॄंगारतळी किंवा मोडका आगार याठिकाणी उतरुन रिक्षा अथवा वडापने पालशेतला जाता येते.

पालशेत गावातून दोन मार्गांनी सुसरोंडीच्या गुहेत जाता येते.

१)  पालशेत गावातून एक रस्ता पोमेंडी गावाकडे जातो. या रस्त्यावर बौद्धवाडी, बारभाई आहे. या बौद्धवाडीतून  एक प्राचीन वाट सुसरोंडीच्या सड्यावर जाते. या चढाईच्या मार्गाने गुहेपर्यंत जाण्यास पाऊण ते एक तास लागतो.

२)  पालशेत गावातून पक्का रस्ता निवोशीला जातो . या रस्त्यावर एक मोबाईल टॉवर आहे त्याजवळून एक वाट सड्यारुन सुसरोंडीच्या गुहेजवळ जाते. या मार्गाने मोबाईल टॉवर ते गुहेपर्यंत जाण्यास अर्धा तास लागतो.


पालशेत गावातील पुरातन अवशेषांचा नकाशा, 
Map by Mahendra Govekar

Ref :- 1) Acheulian cave at Sursondi, Kokan Maharashtra, by Ashok Marathe , Paper published in ,Current Science Vol 90 No 11,  10 June 2006.

2) भारताची कुळकथा :- डॉ. मधुकर केशव ढवळीकर

3) प्राचीन भारत इतिहास आणि संस्कृती :- डॉ. गो.ब. देगलूरकर



Water stream near cave, Susrondi



 पालशेत गुंफा :
गुहागरपासून हेदवीकडे जाताना पालशेत लागतं. इथेही बघण्यासारख्या अनेक गोष्टी आहेत. भरपूर वनराई, मंदिरं, डोंगर, नद्या, समुद्रकिनारा असं सारं असूनही इथे पर्यटकांची गर्दी नसते. आणि म्हणूनच इथला निसर्ग स्वत:चं वैभव व्यवस्थित टिकवून आहे कदाचित. गावातून हेदवीकडे जाणाऱ्या रस्त्यावर मारुती मंदिर आहे. या मंदिराशेजारी सती वृंदावन व सतीशिळा आहे. वृंदावनावरच्या शिळांवर पावले कोरलेली आहेत. समोर नंदीसदृश शिळा दिसते. पालशेत गावातील विचारे घराण्यातील सती गेलेल्या साध्वीचे हे वृंदावन असून त्यांच्या वंशजांनी वृंदावनाचा जीर्णोद्धार केला आहे. सतीशिळा मात्र वृंदावनापासून १५-२० फूट लांब एका खासगी जागेत आहे. या शिळेवर काटकोनात दुमडलेला हाताचा पंजा दिसतो. त्याखालील चिन्हे जमिनीत असल्याने दिसत नाहीत. या शिळेला देवत्त्व दिले गेले असून गावकरी सतीशिळेबद्दल अनभिज्ञ आहेत. कोकणात अशी अनभिज्ञता अनेक ठिकाणी आढळते.
    इथूनच लक्ष्मीनारायण मंदिराकडे जाणारा फाटा फुटतो. या मंदिराला लागूनच २००१मध्ये प्रथमच डेक्कन कॉलेजमधील पुरावास्तू संशोधक अशोक मराठे यांनी बंदर  शोधून काढली. आहे. हे बंदर जांभा दगडाचे असून किल्ल्याच्या बुरुजाप्रमाणे गोल बांधकाम आहे. ते गाळाने भरले असून पडझडही होत आहे. आताचा समुद्रकिनारा आणि बंदर या प्राचीन बंदरापासून २-३ किलोमीटर लांब आहे.

    या प्राचीन बंदराच्या पुढे गावाचा काळे वठार नावाचा भाग लागतो. इथे एक प्राथमिक शाळा आहे. या शाळेत रस्त्यापासून पायऱ्या उतरून खाली जावे लागते. या पायऱ्यांच्या कडेला एका बांबूच्या बेटाशी एक अत्यंत रेखीव विष्णूमूर्ती काळाचे आघात सोसत, ऊनापावसात उभी आहे. मूर्तीचा चेहरा व चारपैकी दोन हात भग्न आहेत. इथे थोडी अंधश्रद्धा असल्याने मूर्तीसमोर नारळ ठेवले जातात. या मूर्तीच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने काही पावले त्वरित उचलणे गरजेचे आहे.
  याच गावात सुसरोंडी भागात पुराश्मयुगीन दगडी गुहा व हात कुऱ्हाड, तोड कुऱ्हाड, फरशी, तासव्या अशी दगडी हत्यारे सापडली आहेत. ही गुहा कोकणातील मानवी वस्तीची प्राचीन खूण आहे. सुमारे ९० हजार वर्षांपूर्वीची अश्मयुगीन मानवी वस्ती असल्याचा पहिला पुरावा येथे मिळाला. स्थानिक या गुहेला वाघबिळ म्हणतात. ट्रेंर्किंगची आवड व पुरावास्तू अभ्यासाची आवड असणाऱ्यांनी येथे जरूर भेट द्यावी.

हेदवीकडे जाताना ‘काकस्पर्श’ चित्रपटाचे चित्रीकरण झालेला पालशेतमधील नेनेवाडा पाहणाऱ्या पर्यटकांनी ही ठिकाणंसुद्धा आवर्जून पाहायला हरकत नाहीत.

कातळशिल्प म्हणजे काय ? - सिंहासन" 


अश्मयुगातील मानवाने तयार केलेली गुहाचित्रे उभ्या दगडांवर / भिंतींवर असतात. तर आडव्या भूपृष्ठावर असणाऱ्या चित्रांना / आकृत्यांना जिओगलिप्स असे म्हणतात. महाराष्ट्रात कोकणातील कातळशिल्पे आपले वेगळे अस्तित्व दाखवतात. अश्मयुगातील किंवा प्रागैतिहासिक काळातील मानवाने या आकृत्या नक्की कोणत्या कालखंडात कोरल्या असाव्यात याची निश्चिती नाही. आत्तापर्यंत रत्नागिरी तालुक्यात ४९० पेक्षा जास्त , राजापूरमध्ये २९० पेक्षा जास्त ; तर अश्मयुगातील मानवाने तयार केलेली गुहाचित्रे उभ्या दगडांवर / भिंतींवर असतात. तर आडव्या भूपृष्ठावर असणाऱ्या चित्रांना / आकृत्यांना जिओगलिप्स असे म्हणतात. महाराष्ट्रात कोकणातील कातळशिल्पे आपले वेगळे अस्तित्व दाखवतात. अश्मयुगातील किंवा प्रागैतिहासिक काळातील मानवाने या आकृत्या नक्की कोणत्या कालखंडात कोरल्या असाव्यात याची निश्चिती नाही. आत्तापर्यंत रत्नागिरी तालुक्यात ४९० पेक्षा जास्त , राजापूरमध्ये २९० पेक्षा जास्त ;जास्त इतक्या संख्येने खोदचित्रे नोंदविण्यात आली आहेत.
  कोकणातील या कातळ- खडकातील चित्रांमध्ये अनाकलनीय रचना, मानवाकृती, पक्षी, समुद्री जीव, नागमोडी सर्प, इत्यादी प्रकारचे आकृती दिसतात. त्या आकारानेही प्रचंड मोठ्या आहेत. कोकणात आढळणारी प्रत्येक ठिकाणची शिल्पे वेगवेगळी आहेत. यापूर्वी जगामध्ये इतर ठिकाणी आढळलेली शिल्पे तुलनात्मक दृष्ट्या मऊ प्रकारच्या दगडात कोरलेली आहेत. पण, कोकणातील शिल्पे कोरलेला जांभा दगड त्यामानाने कठीण आहे. हे महत्त्वाचे वैशिष्ट्य आहे. त्यामुळेच प्रदीर्घ कालावधीत त्यावर ऊन-पाऊस, थंडी-वारा अशा वातावरणीय बदलांचा परिणाम होऊनही ती अस्तित्व टिकवून आहेत. कातळशिल्पातील मानवाकृतीला गावराखा किंवा पाच पांडव सुद्धा म्हणतात.


     कशेळी : इथले शिल्प भारतातील सर्वात मोठे कातळशिल्प असावे. इथल्या हत्तीची आकृती १८ मीटर x १३ मीटर इतकी भव्य आहे. हत्तीच्या आकृतिबंधाच्या पोटात वाघ, माकड, शार्क, गेंडा, स्टिंग रे, पक्षी, मोर यांसारख्या ७०/८० प्राणी व पक्षी आकृत्या आहेत.

   देवीहसोळ : येथील आर्यदुर्गा मंदिराजवळ कातळशिल्पे आहेत. शिल्पाचा आकार ८.५० मीटर x ८.५० मीटर आहे. इथले चित्र खरंच अनाकलनीय आहे. आयतामध्ये वेगवेगळ्या भौमितीय रचना असून त्यात कुठेही प्राणी अथवा पक्षी दिसून येत नाही. या चित्राचा चर ८ ते १० सेमी आहे.

 उक्षी : हत्तीचे कातळशिल्प आहे. अतिशय देखण्या हत्तीचे सुळे, कान, शेपूट, सोंड व पाय हे सर्व अवयव सुबकपणे चितारलेले आहेत.

देवदू - येथील चित्रात एकशिंगी गेंडा, हरिणाच्या कुळातील प्राणी, काही अनाकलनीय प्राणी आणि भौमीतिक रचना आहेत. गेंड्यासारखे कान आणि शिंग उठून दिसते. प्राण्याचे आकार नाकड आणि कोल्ह्यासारखे दिसतात.





 बारसू : इथे दोन वाघांच्यामध्ये माणूस उभा असल्याची रचना मानवाच्या खऱ्या आकारापेक्षा मोठ्या प्रमाणावर कोरलेली आहे माणसाच्या शेजारी मासा, ससा आणि मोरसुद्धा आहेत.

जांभरुण :- या ठिकाणी ५० आकृत्या कोरल्या आहेत. त्यापैकी ८ मानवाच्या तर इतर जलचर प्राणी आणि चार पायाच्या प्राण्याचे आकार आहेत.



esakal.com
Devihasol Katal Shilp : देवीहसोळचे कातळशिल्प राजापूरचे सौंदर्य; 300 हून अधिक नमुने, गाव पोचले जागतिक पटलावर
राजेंद्र बाईत
3–4 minutes
देवीहसोळ गावच्या सड्याच्या सुमारे तीन चौरस किमी परिसरात सुमारे पंधरा ठिकाणी आढळून आलेल्या तिनशेहून अधिक चित्र वैशिष्ट्यपूर्ण रचना स्वतःचे वेगळेपण जपणाऱ्‍या आहेत.

राजापूर : रत्नागिरी येथील निसर्गयात्री संस्थेच्या पाठपुराव्याने संचालक, पुरातत्त्व विभाग महाराष्ट्र शासन, सांस्कृतिक कार्य मंत्रालय महाराष्ट्र यांच्या विशेष प्रयत्नातून युनेस्कोच्या जागतिक वारसास्थळ प्रस्तावित यादीमध्ये नऊ ठिकाणांचा समावेश करण्यात आला आहे. यात देवीहसोळ येथील ठिकाणाचा समावेश आहे. आकाराने सर्वात मोठ्या आणि आश्‍चर्यकारक कातळ शिल्प (Katal Shilp Konkan) रचनांचा समावेश असलेले आणि एवढ्या मोठ्या संख्येने एकाच ठिकाणी कातळशिल्प आढळणारे देवीहसोळ हे बहुधा एकमेव गाव आहे.

एकाच परिसरातील कातळशिल्प निर्मितीतील विविध पद्धतीचे हे उत्तम नमुने अश्मयुगीन मानवाच्या अस्तित्वाचे पुरावे मानले जात आहेत. निसर्गसंपदेने नटलेल्या देवीहसोळ गावचा (Devihasol Rajapur) सडा परिसर, निसर्ग आणि मानवी अभिव्यक्तीचा अनोखा संगम याचा आढावा घेणारी मालिका आजपासून.

राजापूर तालुक्यातील देवीहसोळ येथील आर्या दुर्गा मंदिरानजीक असलेले पटसदृश्य कातळशिल्प आणि परिसराचा समावेश जागतिक वारसा स्थळ प्रस्तावित यादीमध्ये केला आहे. ही तालुक्यासाठी अत्यंत गौरवाची बाब आहे. जागतिक पटलावर आलेल्या देवीहसोळ गावच्या सड्यावर तब्बल तीनशेहून अधिक विविध कातळशिल्प आहेत.

तालुक्यातील देवीहसोळ हे मुचकुंदी आणि बेनी या नद्यांच्या संगमावर वसलेले गाव. गावाला निसर्गाचा वरदहस्त लाभला आहे. या वैभवात भर घालणारी मुचकुंदी नदी एका बाजूला आणि दुसऱ्‍या बाजूला ऋतुमानानुसार विविध रूपे दाखविणारा विस्तीर्ण सडा अशी वैशिष्ट्यपूर्ण भौगोलिक रचना या गावाला लाभलेली आहे. गावच्या सड्यावर ग्रामदेवता जाकादेवी आणि आर्यादुर्गा देवीचे मंदिर असून हे देवस्थान रत्नागिरी जिल्ह्यासह राज्यभरामध्ये प्रसिद्ध आहे. या मंदिरालगतच भलेमोठे पटसदृश कातळशिल्प असून सुमारे २४ फूट लांब व जवळपास तेवढीच रुंद, अत्यंत ठसठशीत, उठावाचे चित्र असावे असा भास निर्माण करणारी आणि आपल्या तर्क शक्तीला आव्हान देणारी ही चित्र रचना अनोखी आहेत.

Katal Shilp Devihasol village
Katal Shilp Devihasol villageesakal

याच्याच बाजूला मगर, खेकडा, हॅमर हेड मासा, हत्ती, शिंग सदृश रचना आणि काही सांकेतिक रचना असा साधारण १५ चित्र रचनांचा समूह आढळून येतो. निसर्गयात्री संस्थेचे संशोधक सुधीर रिसबुड, धनंजय मराठे, प्रा. सुरेंद्र ठाकूरदेसाई आणि सहकाऱ्‍यांनी कातळशिल्पांच्या सुरुवातीच्या केलेल्या संशोधनामध्ये देवीहसोळ गावातील अनेक वैशिष्ट्यपूर्ण अशी कातळशिल्प प्रकाशात आली. संशोधनानंतर या टीमचे दहा वर्ष या परिसरातील कातळशिल्पांचे संशोधनाचे काम सुरू आहे.

देवीहसोळ गावच्या सड्याच्या सुमारे तीन चौरस किमी परिसरात सुमारे पंधरा ठिकाणी आढळून आलेल्या तिनशेहून अधिक चित्र वैशिष्ट्यपूर्ण रचना स्वतःचे वेगळेपण जपणाऱ्‍या आहेत. या बाबी या भागात अश्मयुगीन मानवाचे दीर्घकाळ वास्तव्य होते हे निर्देश करत असल्याचे सांगितले जात आहे. त्यादृष्टीने या सर्वांचे समग्र दस्तऐवजीकरण, सखोल संशोधन प्रक्रिया चालू असल्याची माहिती निसर्गयात्री संस्थेचे सुधीर रिसबुड यांनी दिली.

mmcnewsnetwork.com
धामापूर सड्यावर आढळले शिकारीचे कातळशिल्प, गुहा आणि दगडी हत्यारे
mmcnews mmcnews
4–5 minutes
धामापूर सड्यावर आढळले शिकारीचे कातळशिल्प, गुहा आणि दगडी हत्यारे

सिंधुदुर्ग, दि. ८ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : धामापूर, साळेल आणि मोगरणे गावच्या सीमेवरील सड्यावर आणखी कातळशिल्पांचा शोध लागला आहे. या ठिकाणी प्रथमच शिकारी आणि रानडुक्कर यांचे कातळशिल्प, तसेच अश्मयुगीन गुहा आणि काही दगडी हत्यारे सापडली आहेत, अशी माहिती कातळशिल्प अभ्यासक सतीश लळीत यांनी दिली.

 साळेल येथील युवक परेश गावडे, नंदू गावडे, गणेश गावडे यांना काही दिवसांपूर्वीच ते अळंबी शोधण्यासाठी गेले असता धामापूरच्या सड्यावर गोड्याची वाडी हद्दीत दोन कातळशिल्पे आढळून आली होती. सिद्धेश आचरेकर, अनिकेत पाटील यांनी या युवकांसह त्या ठिकाणी जाऊन या कातळशिल्पांची स्वच्छता केली आणि त्याभोवती दगड रचून ठेवण्याचे कौतुकास्पद काम केले.

 या माहितीच्या आधारे लळीत यांनी या परिसरात आणखी काही कातळशिल्पे असण्याची शक्यता लक्षात घेऊन डॉ. सई लळीत तसेच शुभेन्दू लळीत यांच्यासह शोधमोहीम राबवली. या मोहिमेत आणखी काही कातळशिल्पे आढळून आली. विशेष म्हणजे प्रथमच शिकारी माणसाचे कातळशिल्प आढळून आले आहे. एका मानवाकृतीच्या हातात कुऱ्हाडसदृश शस्त्र असून ती व्यक्ती कोणाचातरी पाठलाग करीत आहे, असे हे कातळशिल्प पाहिल्यावर लक्षात येते.

याच्या बाजूलाच एका रानडुकराचे कातळशिल्प खोदलेले आहे. याचबरोबर गोड्याची वाडी येथे याआधी सापडलेल्या कातळशिल्पापासून सुमारे पाऊण किलोमीटर अंतरावर २४ बाय १८ फुट आकाराचे एक भव्य कातळ शिल्प दिसून येते. हे कातळशिल्प अत्यंत आकर्षक आणि भौमितिक रचनांचे आहे. अमूर्त शैलीतील ही एक मानवाकृती आहे, असे प्रथमदर्शनी वाटते. मात्र अन्य ठिकाणी आढळलेल्या मानवाकृती आणि या आकृतीमध्ये पुष्कळ फरक आहे, अशी माहिती लळीत यांनी दिली.

 ज्या ठिकाणी शिकार करणारी व्यक्ती आणि रानडुकराचे कातळशिल्प सापडले, तेथील परिसरात शोध घेतला असता तिथून अगदी जवळच एक नैसर्गिक गुहा आढळून आली. साधारणपणे चार ते पाच व्यक्ती बसू शकतील, अशा आकाराची ही गुहा आहे. या गुहेच्या परिसरात 14 ठिकाणी ‘वॉटर होल्स’ म्हणजे कातळात असलेले पाणी साठवण्याचे खड्डे सापडले आहेत. हे खड्डे खोल असतात आणि  त्यात पावसाचे पाणी साठून राहते. हे पाणी अगदी एप्रिल, मे महिन्यापर्यंत उपलब्ध असते, असे आढळून आले आहे.

कुडोपी येथील ‘बाहुल्यांचे टेंब’ येथील कातळशिल्पांच्या ठिकाणीही अशा प्रकारचे वॉटर होल्स आढळून आले आहेत. प्राचीन काळातील ही पाणी व्यवस्थापन प्रणाली आहे. तथापि कातळशिल्पे, गुहा आणि वॉटर होल्स एकाच ठिकाणी सापडण्याची ही पहिलीच वेळ आहे. यादृष्टीने धामापूर-मोगरणे सडा हे पुरातत्वीय महत्त्वाचे ठिकाण आहे, असे लळीत यांचे म्हणणे आहे.
 

अमश्युगीन हत्यारेही सापडली

या गुहेच्या परिसरात शोध घेतला असता अश्मयुगीन दगडी हत्यारेही आढळून आली. ही हत्यारे स्क्रेपर्स म्हणजे ‘तासण्या’ या प्रकारची आहेत. मेलेल्या जनावराला कापण्यासाठी किंवा त्याच्या चामडीपासून चरबी अलग करण्यासाठी ह्या तासण्या वापरल्या जात असत, अशी माहिती त्यांनी दिली.

 साळेल, मोगरणे आणि धामापूर या तीन गावांच्या सीमेवर असलेल्या या विस्तीर्ण सड्यावर आणखीही कातळशिल्पे असण्याची शक्यता आहे. मात्र मुसळधार पाऊस आणि अलीकडेच एका वन्यश्वापदाने शेळीवर केलेल्या हल्ल्याची घटना ताजी असल्याची माहिती स्थानिकांनी दिल्यामुळे ही मोहीम पूर्ण दिवस राबवता आली नाही. पावसाळ्यानंतर या परिसरात मोठ्या प्रमाणात शोधमोहीम राबवली जाणार असल्याचे लळीत यांनी सांगितले.

 हिवाळे येथील जिल्ह्यातील पहिल्या कातळशिल्पांचा शोध 2001 मध्ये लावल्यापासून लळीत यांनी अनेक ठिकाणची कातळशिल्पे उजेडात आणली. गेल्या वर्षी जूनमध्ये त्यांनी खोटले (धनगरवाडी क्र.२) येथील ४० हून अधिक कातळशिल्पांचा शोध लावला. याचबरोबर चंद्रवदन कुडाळकर, प्रसाद करंदीकर, डॉ. कमलेश चव्हाण, गुरुनाथ राणे, गणेश मेस्त्री, संतोष वरक, रणजित हिर्लेकर, अजित टाककर, कमलेश गोसावी यांच्यासह अनेकांनी कुडोपी, वानिवडे, वाघोटण, कुणकेश्वर, दाभोळे पोखरबाव, बापर्डे, किर्लोस,  हेदुळ, ओवळीये, खुडी, आरे यासह सुमारे वीस ठिकाणी  कातळशिल्पांचा शोध आतापर्यंत लावला आहे.

 जिल्ह्यातील अशा तीनशेहून अधिक कातळशिल्पांचा अभ्यास करुन लळीत यांनी त्याबाबतचे शोधनिबंध पुरातत्त्वीय परिषदांमध्ये सादर केले आहेत. ‘सिंधुदुर्गातील कातळशिल्पे’ हे त्यांचे पुस्तकही प्रसिद्ध आहे. कुडोपी येथील ८० कातळशिल्पांचा समूह (क्लस्टर) असलेल्या ठिकाणाचा समावेश ‘युनेस्को’ने ‘जागतिक वारसा स्थळां’च्या प्राथमिक यादीत केला आहे. त्याची पुढील कार्यवाही सुरु आहे. मात्र, बहुतांश ठिकाणची कातळशिल्पे चिरेखाणींच्या विळख्यात सापडली असून अनेक ठिकाणी ती नष्टही झाली आहेत.

धामापूर, खोटले येथील कातळशिल्पांपासून चिरेखाणी तर काही फुटांवर आल्या आहेत. याकडे असेच दुर्लक्ष राहिले तर पुरातत्वीय वारसा आणि पर्यटन यादृष्टीने महत्वाचा असा हा प्राचीन मानवी वारसा नष्ट होण्याची भीती लळीत यांनी व्यक्त केली आहे.

samantfort.blogspot.com
Offbeat Kokan गुढरम्य कातळशिल्प (Rock art near Malvan, Dist. Sindhudurg)
अमित सामंत ( AMIT S. SAMANT)
4–5 minutes

"कुंभडक" 
मालवणच्या घरी गेलो की, मी घरी स्वस्थ बसत नाही. सुदैवाने सिंधुदुर्ग जिल्ह्यात पहाण्यासारखी इतकी ठिकाण आहेत की, मला कधीच निराश व्हाव लागल नाही. काही दिवसापूर्वी लोकसत्ता मध्ये बातमी आली होती, "मालवणजवळ आदिमानव कालिन कातळशिल्प मिळाली". यापूर्वी मी मध्यप्रदेशातील भिमबेटकाच्या आदिमानवाच्या गुहा व चित्र पाहिली होती, त्यामुळे आमच्या कोकणातल्या आदिमानवांनी काढलेली कातळशिल्प पहाण्यासाठी मी उत्सुक होतो. 





मालवण पासून ३० किमीवर असलेले कुडोपी गाव थोड आडबाजूला आहे. डोंगराततून वहात येणार पाणी पाटाने गावात खेळवल आहे. त्यावरच गावाची शेती -बागायती व धुण - भांड्यांच्या पाण्याची गरज भागते. गावात कातळशिल्पांबद्दल चौकशी केली, पण अस काहीही आपल्या गावात नाही आहे अस गावकर्‍यांनी सांगितल. तितक्यात मला आठवल की, आमच्या गावात दगडात कोरलेली प्रचंड विहिर आहे. ही विहिर पांडवांची विहिर म्हणून ओळखली जाते. (आपल्या भारतात गावातल्याच सामान्य लोकांनी पिढ्यान पिढ्या खपून काही अचाट, प्रचंड काम केलेलं असल तर त्याला पांडवांच नाव दिले्ले आढळते.) त्यामुळे या कातळशिल्पांनाही पांडवांचा काही संदर्भ असेल, म्हणून पांडवाच्या शिल्पांबद्दल विचारल्यावर गावकर्‍यांनी होकार दिला, ते म्हणाले "पांडवाची चित्र " सड्यावर आहेत. गावातल्या तरूण पिढीला या पांडवांच्या चित्राबद्दल फारशी माहिती नव्हती. (हि खरतर आपली शोकांतीका आहे. आजवर अनेक ठिकाणी फिरतांना मला असा अनुभव आलेला आहे, आपल्या गावात पहाण्या लायक एखादी ऎतिहासिक गोष्ट आहे, हेच बर्‍याच जणांना माहित नसते.)



गावातल्या एका बुजुर्ग व्यक्तीला बरोबर घेऊन आम्ही गावाच्या मागचा डोंगर चढायला सुरुवात केली. वाटेत एका झाडावर शेणाने बनवलेल मधमाश्यांच ३ फूट उंचीच उलट्या नरसाळ्याच्या (फनेलच्या) आकाराच पोळ बघायला मिळाल. स्थानिक लोक या पोळयाला "कुंभडक" म्हणतात. शेणाने बनवलेल्या या पोळ्याच्या बाहेरच्या बाजूला हाताने जमिन सारवल्यावर जशी नक्षी येते तशीच नक्षी मधमाशांनी पायांनी तयार केलेली दिसली. डोंगराच्या माथ्यावर पोहोचल्यावर क्षितिजापर्यंत पसरलेला सडा व त्यावरच पिवळ पडलेल गवत नजरेत मावत नव्हत. पंधरा मिनिट सड्यावर चालल्यावर अचानक आदिमानवाने कातळात कोरलेली चित्र दिसायला लागली. त्यांचे आकार व गुढरम्यता पाहून आम्ही थक्क झालो. मी आणि कौस्तुभ त्या शिल्पांवरच गवत उपटून त्यांचे आकार ओळखण्याचा प्रयत्न करू लागलो. माणूस, झाडे, पशू, पक्षी, मासे इत्यादी आकार आम्ही ओळखू शकलो. यातील एका  मानवाकृतीची लांबी ३.५ मीटर भरली तर, एका वर्तूळाकृती चित्राचा परिघ ३ मीटर होता. काही चित्रांचे आकार मात्र गुढरम्य होते. त्यांचे आकार पाहून मला शामलन नाईटच्या "साईन्स (Signs)" या हॉलिवूडपटाची आठवण झाली. त्यात परग्रहवासी शेतांमध्ये मोठ मोठी वर्तूळं, चिन्ह काढून ठेवतात. पण ही चित्र मात्र आदिमानवानेच काढलेली होती. त्यात दैनंदिन जीवनात आजूबाजूला दिसणारी माणस, प्राणी, निसर्ग चितारण्याचा प्रयत्न दिसत होता. अशा चित्रप्रकाराला शास्त्रीय भाषेत "रॉक आर्ट" म्हणतात. कुडोपीच्या या कातळचित्रांचाही श्री.सतीश लळित यांनी अभ्यास करून त्यावर पेपरही प्रसिध्द केलेला आहे. एकूण ६० चित्र त्या माळावर विखुरलेली आहेत. ती शोधून त्यांचा अर्थ लावता लावता तीन तास कधी निघून गेले कळलच नाही. परतांना मनात सारखा विचार येत होता , कोकणातला धुवाधार पाऊस, सड्यावरचा ठिसूळ दगड, वारा, गवत यांच्याशी झुंज देत ही चित्र हजारो वर्ष तशीच पडली आहेत आज त्यातील बरीच चित्र नष्ट झाली आहेत, पुसट झाली आहेत. आता जर या चित्रांचे योग्य संरक्षण केल नाही तर उरलेला आपला हा राष्ट्रीय ठेवा सुध्दा नष्ट होईल.


मानवाकृती 

त्रिशूळ 


जाण्यासाठी :- मालवण - देवगड रस्त्यावर मालवण पासून २२ किमीवर आचरा गाव आहे. आचर्‍याहून एक रस्ता कणकवलीला जातो. या रस्त्यावर आचर्‍यापासून २.५ किमीवर डावीकडे कुडोपी गावाकडे जाणारा फाटा फूटतो. या फाट्याने ६ किमी गेल्यावर गणपती मंदिर आहे. येथून उजव्या बाजूला एक रस्ता कुडोपी टेंब वाडीत जातो. वाडीत पोहोचल्यावर गावातून वाटाड्या घेऊन कातळशिल्प पहायला जावे.



मासे 

मानवाकृती 




कातळशिल्पाच्या परीघावर ३ जण उभे आहेत.




३.५ मीटर लाबं मानवी शिल्पाचा पाय 


kokansadlive.com
सिंधुदुर्गात प्रथमच सापडले शिकारीचे कातळशिल्प | गुहा आणि दगडी हत्यारे
4–5 minutes
सिंधुदुर्गनगरी : धामापूर, साळेल आणि मोगरणे गावच्या सीमेवरील सड्यावर आणखी कातळशिल्पांचा शोध लागला आहे. या ठिकाणी प्रथमच शिकारी आणि रानडुक्कर यांचे कातळशिल्प, तसेच अश्मयुगीन गुहा आणि काही दगडी हत्यारे सापडली आहेत, अशी माहिती कातळशिल्प अभ्यासक सतीश लळीत यांनी दिली.

 

साळेल येथील युवक परेश गावडे, नंदू गावडे, गणेश गावडे यांना काही दिवसांपूर्वीच ते अळंबी शोधण्यासाठी गेले असता धामापूरच्या सड्यावर गोड्याची वाडी हद्दीत दोन कातळशिल्पे आढळून आली होती. सिद्धेश आचरेकर, अनिकेत पाटील यांनी या युवकांसह त्या ठिकाणी जाऊन या कातळशिल्पांची स्वच्छता केली व त्याभोवती दगड रचून ठेवण्याचे कौतुकास्पद काम केले.



या माहितीच्या आधारे श्री. लळीत यांनी या परिसरात आणखी काही कातळशिल्पे असण्याची शक्यता लक्षात घेऊन डॉ. सई लळीत व शुभेन्दू लळीत यांच्यासह शोधमोहीम राबवली. या मोहिमेत आणखी काही कातळशिल्पे आढळून आली. विशेष म्हणजे प्रथमच शिकारी माणसाचे कातळशिल्प आढळून आले आहे. एका मानवाकृतीच्या हातात कुऱ्हाडसदृश शस्त्र असून ती व्यक्ती कोणाचातरी पाठलाग करीत आहे, असे हे कातळशिल्प पाहिल्यावर लक्षात येते. याच्या बाजूलाच एका रानडुकराचे कातळशिल्प खोदलेले आहे. याचबरोबर गोड्याची वाडी येथे याआधी सापडलेल्या कातळशिल्पापासून सुमारे पाऊण किलोमीटर अंतरावर २४ बाय १८ फुट आकाराचे एक भव्य कातळ शिल्प दिसून येते. हे कातळशिल्प अत्यंत आकर्षक आणि भौमितिक रचनांचे आहे. अमूर्त शैलीतील ही एक मानवाकृती आहे, असे प्रथमदर्शनी वाटते. मात्र अन्य ठिकाणी आढळलेल्या मानवाकृती आणि या आकृतीमध्ये पुष्कळ फरक आहे, अशी माहिती श्री. लळीत यांनी दिली.

 

ज्या ठिकाणी शिकार करणारी व्यक्ती आणि रानडुकराचे कातळशिल्प सापडले, तेथील परिसरात शोध घेतला असता तिथून अगदी जवळच एक नैसर्गिक गुहा आढळून आली. साधारणपणे चार ते पाच व्यक्ती बसू शकतील, अशा आकाराची ही गुहा आहे. या गुहेच्या परिसरात 14 ठिकाणी 'वॉटर होल्स' म्हणजे कातळात असलेले पाणी साठवण्याचे खड्डे सापडले आहेत. हे खड्डे खोल असतात व  त्यात पावसाचे पाणी साठून राहते. हे पाणी अगदी एप्रिल, मे महिन्यापर्यंत उपलब्ध असते, असे आढळून आले आहे. कुडोपी येथील 'बाहुल्यांचे टेंब' येथील कातळशिल्पांच्या ठिकाणीही अशा प्रकारचे वॉटर होल्स आढळून आले आहेत. प्राचीन काळातील ही पाणी व्यवस्थापन प्रणाली आहे. तथापि कातळशिल्पे, गुहा आणि वॉटर होल्स एकाच ठिकाणी सापडण्याची ही पहिलीच वेळ आहे. यादृष्टीने धामापूर-मोगरणे सडा हे पुरातत्वीय महत्त्वाचे ठिकाण आहे, असे श्री. लळीत यांचे म्हणणे आहे.

 

या गुहेच्या परिसरात शोध घेतला असता अश्मयुगीन दगडी हत्यारेही आढळून आली. ही हत्यारे स्क्रेपर्स म्हणजे 'तासण्या' या प्रकारची आहेत. मेलेल्या जनावराला कापण्यासाठी किंवा त्याच्या चामडीपासून चरबी अलग करण्यासाठी ह्या तासण्या वापरल्या जात असत, अशी माहिती त्यांनी दिली.

साळेल, मोगरणे आणि धामापूर या तीन गावांच्या सीमेवर असलेल्या या विस्तीर्ण सड्यावर आणखीही कातळशिल्पे असण्याची शक्यता आहे. मात्र मुसळधार पाऊस आणि अलीकडेच एका वन्यश्वापदाने शेळीवर केलेल्या हल्ल्याची घटना ताजी असल्याची माहिती स्थानिकांनी दिल्यामुळे ही मोहीम पूर्ण दिवस राबवता आली नाही. पावसाळ्यानंतर या परिसरात मोठ्या प्रमाणात शोधमोहीम राबवली जाणार असल्याचे श्री.लळीत यांनी सांगितले.

हिवाळे येथील जिल्ह्यातील पहिल्या कातळशिल्पांचा शोध 2001 मध्ये लावल्यापासून श्री. लळीत यांनी अनेक ठिकाणची कातळशिल्पे उजेडात आणली. गेल्या वर्षी जूनमध्ये त्यांनी खोटले (धनगरवाडी क्र.२) येथील ४० हून अधिक कातळशिल्पांचा शोध लावला. याचबरोबर चंद्रवदन कुडाळकर, प्रसाद करंदीकर, डॉ. कमलेश चव्हाण, गुरुनाथ राणे, गणेश मेस्त्री, संतोष वरक, रणजित हिर्लेकर, अजित टाककर, कमलेश गोसावी यांच्यासह अनेकांनी कुडोपी, वानिवडे, वाघोटण, कुणकेश्वर, दाभोळे पोखरबाव, बापर्डे, किर्लोस,  हेदुळ, ओवळीये, खुडी, आरे यासह सुमारे वीस ठिकाणी  कातळशिल्पांचा शोध आतापर्यंत लावला आहे.



जिल्ह्यातील अशा तीनशेहून अधिक कातळशिल्पांचा अभ्यास करुन श्री. लळीत यांनी त्याबाबतचे शोधनिबंध पुरातत्त्वीय परिषदांमध्ये सादर केले आहेत. 'सिंधुदुर्गातील कातळशिल्पे' हे त्यांचे पुस्तकही प्रसिद्ध आहे. कुडोपी येथील ८० कातळशिल्पांचा समूह (क्लस्टर) असलेल्या ठिकाणाचा समावेश 'युनेस्को'ने 'जागतिक वारसा स्थळां'च्या प्राथमिक यादीत केला आहे. त्याची पुढील कार्यवाही सुरु आहे. मात्र, बहुतांश ठिकाणची कातळशिल्पे चिरेखाणींच्या विळख्यात सापडली असून अनेक ठिकाणी ती नष्टही झाली आहेत. धामापूर, खोटले येथील कातळशिल्पांपासुन चिरेखाणी तर काही फुटांवर आल्या आहेत. याकडे असेच दुर्लक्ष राहिले तर पुरातत्वीय वारसा आणि पर्यटन यादृष्टीने महत्वाचा असा हा प्राचीन मानवी वारसा नष्ट होण्याची भीती श्री. लळीत यांनी व्यक्त केली आहे.

kokanmedia.in
पूर्वजांच्या पाषाणखुणांच्या शोधाची गोष्ट : कोकणातील कातळ-खोद-चित्रे - साप्ताहिक कोकण मीडिया
Kokan Media
43–55 minutes
गेल्या चार-पाच वर्षांत कोकणातील अनेक ठिकाणी अत्यंत महत्त्वपूर्ण खजिन्याचा शोध लागला आहे. तो खजिना म्हणजेच कातळ-खोद-चित्रे किंवा कातळशिल्पे. हा १० हजार वर्षांपूर्वीच्या मानवी उत्क्रांतीच्या टप्प्यातील ज्ञानाचा मोठा खजिना असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे. या चित्रांमधील विविध रचना, त्यांचे आकार, शैली, मिळालेली दगडी हत्यारे याच्या आधारे भारताच्या प्रागैतिहासिक कालखंडावर नव्याने प्रकाश टाकला जाऊ शकतो. पूर्वजांच्या पाषाणखुणा असलेल्या या वैशिष्ट्यपूर्ण गूढ रचनांचा शोध कसा लागत गेला, कोणत्या संकेतांच्या आधारे स्थानिक अभ्यासक वेगवेगळ्या रचनांपर्यंत पोहोचले, त्याच्याशी जोडलेल्या आख्यायिका कोणत्या आहेत, या ठेव्याच्या संरक्षणासाठी काय केले जात आहे, या गोष्टींबद्दल अनेकांना कुतुहल आहे. हे शोधकार्य ज्या स्थानिक अभ्यासकांनी कुतुहलाने केले आणि हा ठेवा जगासमोर आणला, ते सुधीर रिसबूड, धनंजय मराठे, प्रा. डॉ. सुरेंद्र ठाकूरदेसाई यांनीच मांडलेला हा शोधकार्याचा गूढरम्य प्रवास…
(साप्ताहिक कोकण मीडियाच्या २०१८च्या दिवाळी अंकातील लेख)
………………
रत्नागिरीच्या राजापूर तालुक्यातील बारसू गावाच्या सड्यावर धनगर समाजातील सुमारे ८० वर्षांच्या वृद्ध व्यक्तीबरोबर गप्पा सुरू असताना सड्याच्या दुसऱ्या टोकाला निर्देश करून ‘असे काहीतरी आहे’ असे त्या व्यक्तीने सांगितले आणि जवळपास दीड-दोन वर्षे अंधारात चालू असलेल्या आमच्या कातळ-खोद-चित्र शोधाच्या प्रवासाला आणि मानवी उत्क्रांतीच्या टप्प्यातील ज्ञानाचा एक मोठा खजिना समोर आणण्यासाठी खऱ्या अर्थाने दिशा मिळाली.

अशा प्रकारच्या चित्ररचनांकडे मानवाच्या कलात्मक उत्क्रांतीचा प्राथमिक टप्पा म्हणून पाहिले जाते. मानवी जीवनाच्या प्रदीर्घ इतिहासाच्या वेगवेगळ्या कालखंडात भौगोलिक व सांस्कृतिकदृष्ट्या भिन्न असलेल्या जगाच्या सर्वच भागांत पेट्रोग्लिफ्सची निर्मिती करण्यात आली आहे. सामान्यतः ही कला गुहेच्या भिंतींवर, उभ्या पाषाणाच्या बाजूंवर कोरलेली आहेत. परंतु कोकणात आढळणाऱ्या या कलेचे वैशिष्ट्यपूर्ण वेगळेपण म्हणजे इथे आढळणाऱ्या चित्ररचना तत्कालीन मानवाने उघड्या आकाशाच्या छताखाली कातळ सड्याच्या पृष्ठभागावर आडव्या स्वरूपात कोरल्या आहेत.

कोकणातील किनाऱ्याजवळच्या जांभ्या खडकांच्या खुज्या/कमी उंचीच्या पठारांना स्थानिक भाषेत सडा असे म्हणतात. जांभ्या खडकाच्या सच्छिद्रतेमुळे या पठारांची पाणी धारण करण्याची क्षमता खूप कमी आहे. त्यामुळे या सड्यांवर खुरट्या वनस्पती, पावसाळ्यानंतर उगवणारे गवत या व्यतिरिक्त वृक्षराई फारच अभावाने आढळते. या कारणांनी या पठारांवर आजही फारशी मनुष्यवस्ती आढळत नाही. अशा या सड्यांवर अश्मयुगीन मानवाच्या पाऊलखुणा म्हणजे कातळ-खोद-चित्रे मोठ्या प्रमाणावर आढळून येत आहेत. कातळ सड्यांवर कोरून निर्माण केलेल्या द्विमितीय चित्रांना शास्त्रीय भाषेत पेट्रोग्लिफ्स असे म्हणतात. प्रस्तुत लेख आहे तो या कातळ-खोद-चित्रांच्या शोध प्रवासाचा आणि त्यात आलेल्या अनुभवांचा.

या कातळ-खोद-चित्रांचा शोध हा खरे तर आमच्या ‘आडवळणावरचे कोकण’ या संकल्पनेतील एक भाग. कोकणभूमीची निर्मिती श्री विष्णूचा सहावा अवतार भगवान परशुराम यांनी केली, असे उल्लेख प्राचीन साहित्यातून आपल्यासमोर येतात. भगवान परशुरामांच्या आईचे- रेणुकेचे नाव कुंकणा असे होते. त्यावरून या भूभागाला कोकण असे नाव पडले, असे उल्लेख पुराणातून येतात. अपरान्त म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या भागाला इसवी सनाच्या पाचव्या-सहाव्या शतकापासून कोकण या नावाने ओळखले जाते. अपर या शब्दाचा अर्थ पश्चिम असाही आहे. पश्चिमेच्या शेवटच्या टोकाचा (अन्त) प्रदेश म्हणजे अपरान्त. आजपर्यंत आपण कोकणाचा हा इतिहास शिकत, ऐकत आलो आहोत. परंतु अलीकडे आढळून येत असलेल्या कातळ-खोद-चित्रांमुळे कदाचित कोकणाचा इतिहास नव्याने लिहावा लागेल.

आज ठाणे, रायगड, रत्नागिरी व सिंधुदुर्ग हे चार जिल्हे म्हणजेच कोकण म्हणून ओळखले जाते. भौगोलिकदृष्ट्या सह्याद्री आणि अथांग महासागर यामधील चिंचोळी पट्टी म्हणजे कोकण. डहाणू ते महाड या भागाला उत्तर कोकण, तर कशेडी घाटापासून सिंधुदुर्गातील तेरेखोलच्या खाडीपर्यंतच्या भागाला दक्षिण कोकण म्हणून ओळखले जाते. हवामानदृष्ट्या हा प्रदेश सारखाच असला, तरी उत्तर कोकण व दक्षिण कोकण हे प्रदेश भू-शास्त्रीयदृष्ट्या भिन्न व्यक्तिमत्त्व असलेले प्रदेश आहेत. कोकणाची ओळख असलेला जांभा दगड हा प्रामुख्याने दक्षिण कोकणात आढळून येतो. दक्षिण कोकणाचा हा जांभ्या दगडाचा भूप्रदेश आपल्या अंगा-खांद्यावर, पोटात अनेक रहस्ये घेऊन बसला आहे. त्याचबरोबर हा प्रदेश वैविध्यपूर्ण बाबी, जैवविविधता आणि संस्कृतीच्या विविध अंगांनी ओतप्रोत भरलेला आहे. खरे सांगायचे झाले, तर उभ्या महाराष्ट्रात कोकणासारखा प्रदेश नाही. परंतु ठराविक ठिकाणे, गोष्टी या पलीकडचा कोकण प्रदेश आम्हा कोकणातील लोकांनाच माहिती नाही. निसर्गप्रेमातून आमची भटकंती सुरू झाली आणि या बाबी आमच्या समोर येऊ लागल्या. त्यातूनच जन्माला आली, ती ‘आडवळणावरचे कोकण’ ही संकल्पना.


निवळी येथील कातळ-खोद-चित्रे. (लेखात सर्वांत आधी दिलेला फोटो उक्षीच्या कातळ-खोद-चित्राचा.)
कातळ-खोद-चित्रांच्या शोधप्रवासाला सुरुवात केली, त्या वेळी या विषयातील कोणतेही ज्ञान आम्हाला नव्हते. डोळ्यासमोर होत्या त्या निवळी, देवीहसोळ येथील एक-दोन चित्ररचना. काहीतरी पुरातन आहे, एवढाच काय तो आमचा या चित्रांशी संबंध. प्रा. प्र. के. घाणेकर यांच्या भेटीत या चित्रांचे महत्त्व समजले. आणि ती चित्रे मनावर कोठे तरी कोरली गेली होती.
बारसूच्या सड्यावर भेटलेल्या व्यक्तीने आमच्या चौकशीतील निसटत असलेली कडी गुंफून दिली. त्या भल्याथोरल्या सड्यावर निव्वळ अंगुलीनिर्देशानुसार मिळालेल्या माहितीवरून संबंधित ठिकाण शोधणे म्हणजे एक आव्हानच होते. तुटपुंज्या माहितीच्या जोरावर, दिशादर्शनातून मिळालेल्या ठिकाणी पोहोचलो. हे ठिकाण म्हणजे राजापूर तालुक्यातील गोवळ गावाचा सडा. गावातून सड्यावर येण्यासाठी असलेली पाखाडी. पाखाडी चढताना आजूबाजूच्या निसर्गसौंदर्याचा आस्वाद घेत सड्यावर पाऊल टाकले. नकळतच ‘अरे बापरे’ हे शब्द बाहेर पडले. एवढ्या मोठ्या सड्यावर शोधणार कसे? मिळालेल्या भौगोलिक माहितीच्या आधारे नजरेसमोर एक भासमान क्षेत्र उभे केले. अर्थात त्यासाठी आपल्याला बोलीभाषेतील शब्द, खुणा यांची थोडीफार तरी जाण असावी लागते. ‘हे फडे तिकडे सातवीण त्या अंगाला खरी’ करत प्रत्येक पावलागणिक पायाखाली पाहत मार्गक्रमणा सुरू झाली. थोड्या वेळात ‘इथे काही तरी आहे’ असे शब्दोच्चार झाले. अगदी पुसटपणे दिसत असलेल्या चित्रांना कोणत्याही प्रकारे धक्का लागणार नाही याची काळजी घेऊन साफसफाई सुरू केली. काम करता करता ‘अरे इथे पण आहे, तिकडे पण,’ असे करत करत तब्बल ४२ चित्ररचनांचा समूह समोर आला. या चित्ररचनांमध्ये प्राणी, पक्षी, अनाकलनीय अशा भौमितिक रचना यांचा समावेश होता. प्रत्यक्ष शोधाच्या पहिल्याच पावलावर मिळालेले हे यश आम्हाला आनंद देऊन गेले. हे काम करत असताना त्या वेळचे वातावरण मात्र असह्य करणारे होते. वातावरणातील हा फरक आम्हाला लक्षात येत नव्हता. शक्य तेवढ्या लवकर काम आटोपून तिथून परत फिरण्याचा निर्णय आम्ही घेतला. मुक्कामी परतेपर्यंत एका मोठ्या वादळी पावसाने आम्हाला गाठले आणि वातावरणात झालेल्या फेरबदलाचे कारणदेखील समजले. एका वेगळ्या विषयातील आमचा प्रवेश, सोबत निसर्गातील वेगवेगळे अनुभव यांची व्याप्ती पुढे खूप मोठ्या प्रमाणावर जाईल, याची आम्हाला त्या वेळी कल्पना नव्हती.

अधिक माहिती जाणून घेण्यासाठी आम्हाला परिचित असलेले प्र. के. घाणेकर, डेक्कन महाविद्यालयाचे डॉ. सचिन जोशी व रवींद्र लाड या तज्ज्ञ व्यक्तींशी संपर्क साधला. आम्हाला मिळालेल्या रचना खूपच पुरातन असाव्यात, असा अंदाज त्यांनी व्यक्त केला. त्यावर अधिक अभ्यास करणे गरजेचे आहे, असेही मत त्यांनी व्यक्त केले. हाती लागलेला खजिना कोकणाच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण हे लक्षात आले. ही गोष्ट सर्वांसमोर जाण्यासाठी प्रसारमाध्यमांकडे धाव घेतली. त्याच वेळी महाराष्ट्र राज्याच्या सांस्कृतिक खात्याचे मंत्री विनोद तावडे रत्नागिरी दौऱ्यावर होते. त्यांना भेटून माहिती देण्याचा प्रयत्न केला; पण ती भेट म्हणजे आम्ही निवेदन देणे आणि त्यांनी ते गोड हसत स्वीकारणे, या पलीकडे काही नव्हते. आज हा विषय जगाच्या पाठीवर पोहोचला आहे. असे असतानादेखील त्या खात्याचा प्रतिसाद आजपर्यंत तसाच आहे.

दरम्यानच्या काळात या शोधाच्या आमच्या आतापर्यंतच्या वाटचालीची उजळणी केली. आज सर्वज्ञात असलेला कातळ-खोद-चित्र हा शब्द त्या वेळी सर्वसामान्य माणसांना माहीतदेखील नव्हता. त्या संदर्भात एखाद्याला काही माहिती असल्यास त्याची ओळख निराळी होती. तज्ज्ञ मंडळींकडून मिळालेली माहितीही अत्यंत त्रोटक होती. आम्हाला आलेल्या अनुभवांतून आमची चौकशीची दिशा बदलली. कार्यप्रणालीमध्ये बदल केले. आमच्या बदलेल्या कार्यपद्धतीला यश आले. अल्पावधीतच आठ ते १० ठिकाणी असे काही तरी आहे, अशी माहिती समोर आली. आमची शोधमोहीम तीन टप्प्यांत विभागलेली होती. पहिला टप्प्यात मिळालेल्या संदर्भानुसार खात्री करण्याचा समावेश होता. त्यानुसार खात्री करण्यात आली आणि पाच-सहा ठिकाणी चित्ररचना असल्यावर शिक्कामोर्तब झाले.

दुसऱ्या टप्प्याच्या मोहिमेची कल्पना तत्कालीन जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. संजय शिंदे यांना दिली. शिंदे सर म्हणजे एक निसर्गप्रेमी आणि वर्दीमागील संवेदनशील व्यक्तिमत्त्व. समान आवडीच्या विषयातून ऋणानुबंध जुळून आले. आमच्या गप्पांमध्ये ते एक गोष्ट सातत्याने सांगायचे, की एखादे चांगले काम निःस्वार्थी भावनेने आणि सर्वस्व अर्पून हाती घेतले, की निसर्गही त्याला साथ देतो; आपल्या नकळत ते काम पूर्ण होण्याच्या दृष्टीने वेळोवेळी तशी परिस्थिती निर्माण करतो. गरज असते ती ओळखण्याची. आमच्या कातळ-खोद-चित्रांच्या शोधमोहिमेत त्यांच्या या सांगण्याची प्रचीती आम्हाला सातत्याने येत गेली. त्यांनी लगेचच त्यांच्या परीने मदत देऊ केली. त्यांनी देऊ केलेली ही मदत मोलाची होती. प्रत्यक्ष-अप्रत्यक्षपणे या मदतीचा आम्हाला फायदा झाला. लोकांशी संवाद साधणे सोयीचे गेले.

शोधाच्या या टप्प्यावर एकंदर पाच गावांचा समावेश होता. ही सर्व गावे राजापूर तालुक्यातील होती. (१) सफाईसाठी आवश्यक साहित्य व सोबत्यांसह भालावली गावाच्या सड्यावर पोहोचलो. परिसराची पाहणी करताना पुरातन गोष्टींकडे पाहण्याच्या आपल्याकडील लोकांच्या मानसिकतेचे यथार्थ दर्शन झाले. बहुतांशी चित्रपरिसर बाजूच्या रस्त्यामध्ये व गटारामध्ये नष्ट झाला होता. उर्वरित भागातील चित्रे शोधून साफसफाई केली. या चित्रांमध्ये गोपद्मसदृश भौमितिक रचना, मगर, वराह, पाऊल, ठसे वगैरे रचनांचा समूह मिळाला. या ठिकाणाची कथा येथे संपत नाही. पुढे आम्ही चालविलेल्या प्रयत्नांना रत्नागिरी जिल्हा परिषदेने साथ दिली. या ठिकाणाच्या विकासाकरिता जिल्हा परिषदेकडून निधी मंजूर झाला, असे कळले. या परिसराचा विकास तर सोडाच, परंतु याच ठिकाणी झालेल्या अन्य एका शासकीय कामात चित्रपरिसराला धक्क्का बसून दोन-तीन चित्रे कायमस्वरूपी नष्ट झाली आहेत. एकंदर घडलेल्या सर्व प्रकारातून लोकांची आस्था नक्की कशात आहे, यावर मात्र आमच्या मनात प्रश्नचिन्ह उभे राहिले.

बरोबर उलटा अनुभव सोलगावात आला. (२) तिथे पोहोचलो, तेव्हा त्या गावचे काही ग्रामस्थ आणि पोलीस पाटील वाट पाहत होते. गावातून घाटीने चित्रपरिसरात पोहचण्यास सुमारे अर्धा तास चालत जावे लागते. या ठिकाणी असलेल्या रचनांना एक आख्यायिका चिकटलेली आहे. सड्यावर वावरणारी गावातील वृद्ध मंडळी चित्रपरिसराला भोपळिणीचा वेल म्हणून ओळखतात. या वेलाचे मूद (मूळ) ज्याला सापडेले, त्याला संपत्ती मिळेल अशी धारणा. या समजापोटी या चित्रपरिसरात एका चित्रावर पहारीने खणल्याच्या खुणा आहेत. साफसफाई केल्यावर चित्ररचना स्पष्ट झाल्या. या रचनांमध्ये गवा रेडा, वाघ व एका अनाकलनीय चित्ररचनेबरोबर मोठ्या आकाराची भौमितिक रचना आढळून आली.

परतीच्या वाटेवर आपापसांत झालेल्या गप्पांमधून एक निराळीच गोष्ट समोर आली. या चित्रपरिसरापासूव थोड्या अंतरावर जांगळी लोकांचा देव आहे. या सड्यावर येण्यासाठी जेथून चालायला सुरुवात करतो, तिथे गांगो मंदिर (गांगेश्वर) आहे. देवाला कौल लावण्याची प्रथा कोकणात हजारो वर्षांपासून आहे. येथे गांगेश्वराला कौल लावला जातो. कधीकधी गांगेश्वर कौल देत नाही. जांगळी लोक ज्या वेळी त्यांच्या देवाला कौल लावतात, त्या वेळी गांगेश्वर कौल देत नाही, असा समज इथे आहे. एक वेगळीच गोष्ट.

आपल्या गावातील प्राचीन ठेवा जपण्यासाठी आवश्यक ती सर्व मदत देण्याचे आश्वासन सोबत असलेल्या गावकऱ्यांनी दिले. त्यांचे हे आश्वासन राजकीय नेते, सरकार यांसारखे नव्हते. ती जागा मूळ मालकाने काही कारणास्तव विकायला काढली आणि असलेल्या चित्रांचे संरक्षण करण्याच्या अटीवर नवीन माणसाने ती जागा विकत घेतली. ग्रामस्थांच्या सहकार्याने त्या चित्रांभोवती तात्पुरत्या स्वरूपात का होईना, चिऱ्यांच्या दगडांची रांग लावून ती जागा कायमस्वरूपी अधोरेखित केली आहे. योग्य माहिती मिळाल्यावर पुरातन ठेवा जपण्यासाठी तेथील लोकांची धडपड खरेच कौतुकास्पद आहे.

असाच अनुभव आम्हाला देवाचे गोठणे या गावात आला. (३) लोकसंख्या व क्षेत्रफळानुसार राजापूर तालुक्यातील हे सर्वांत मोठे गाव. या गावात कोकणाचा निर्माता श्री भार्गवरामाचे म्हणजेच परशुरामाचे मंदिर आहे. या मंदिराला सुमारे ३५०-४०० वर्षांचा इतिहास लाभला आहे. इ. स. १७१० ते १७२०च्या दरम्यान ब्रह्मेन्द्र स्वामी यांनी मूळच्या गोवर्धनेश्वर मंदिराचा जीर्णोद्धार केला व श्री भार्गवरामाच्या मंदिराची स्थापना केली. येथे असलेली भार्गवरामाची मूर्ती आगळीवेगळी असून, अशा प्रकारची मूर्ती अन्यत्र कोठेही पाहायला मिळत नाही. फरसबंदीयुक्त प्राकार असलेले मुघल-मराठा मिश्र शैलीतील हे मंदिर पाहणे, अनुभवणे हा एक स्वतंत्र विषय आहे. जैवविविधतेने संपन्न असलेल्या या देवाचे गोठणे गावाच्या सड्यावर व परिसरात निसर्ग नवलाई व आश्चर्येदेखील पाहायला मिळतात. मंदिराजवळच्या सड्यावर सुमारे साडेसात फूट लांबीची मनुष्याकृती कोरलेली आहे. या रचनेची स्थानिक ओळख रावण अशी आहे. त्यावरून या सड्याला रावणाचा सडा असेही ओळखले जाते. सीतेच्या शोधात निघालेला रावण या ठिकाणी ठेच लागून उताणी पडला. त्याचा उमटलेला हा ठसा, अशी मजेशीर आख्यायिका या चित्ररचनेच्या बाबतीत सांगितली जाते. या चित्ररचनेच्या आजूबाजूला आणखीही काही रचना आहेत; पण त्या फार अस्पष्ट आहेत. या रचनांचा शोध घेत असताना आम्हाला एक अनोखी गोष्ट मिळाली.

गावागावातून चौकशी करणे, संदर्भ जाणून घेणे, मिळालेल्या संदर्भांनुसार ठिकाणाचा शोध घेणे, ठिकाणाची खात्री झाली की तिथे शोधमोहीम राबविणे, त्या जागेची साफसफाई वगैरे करत चित्ररचना उजेडात आणणे, जागेचा संपूर्ण तपशील नोंद करणे, दिशा, अक्षांश-रेखांश यांची नोंद करणे, जागेचा नकाशा बनविणे, चित्ररचनांचा नकाशा तयार करणे, आजूबाजूच्या विविध गोष्टींची नोंद घेणे, आख्यायिका, प्रथा वगैरे समजून घेणे… असे म्हणजे थोडक्यात सांगायचे झाले, तर त्या जागेचा संपूर्ण दस्तऐवज तयार करण्याचा प्रयत्न आम्ही अंगीकारला होता.. अगदी सुरुवातीपासूनच.

या ठिकाणाचा असा दस्तऐवज तयार करताना त्या परिसरातील एका नैसर्गिक चमत्काराचा शोध आम्हाला लागला. तो चमत्कार होता चुंबकीय विस्थापनाचा. कातळचित्र आणि आजूबाजूच्या ठराविक परिसरात होकायंत्रातील चुंबकसुई योग्य दिशादर्शन करत नाही, असे लक्षात आले. होकायंत्रातील चुंबकसुई उत्तर दिशा न दाखवता कधी घड्याळ्याच्या काट्याच्या दिशेने, तर कधी विरुद्ध दिशेने, तर काही ठिकाणी ती स्वतःभोवती फिरतच राहते, हे लक्षात आले. एक आश्चर्यकारक गोष्ट समोर आली. काही वेळ विश्वासच बसेना. या ठिकाणी कोणत्या तरी चुंबकीय क्षेत्राचा प्रभाव अधिक असल्याने हे घडत आहे, हे लक्षात आले; पण हा विषय सोबत असलेल्या ग्रामस्थांच्या आकलनापलीकडचा होता. एक तर या चित्रपरिसराला रावणाचा सडा म्हणतात. त्यामुळे काही ना काही श्रद्धा-अंधश्रद्धा चिकटलेल्या. त्यात त्यांच्या डोळ्यासमोर होकायंत्रातील गोलगोल फिरणारा काटा. ग्रामस्थांच्या चेहऱ्यावर आश्चर्य आणि भीतीचे भाव उमटले होते. त्यातूनच त्यांनी ‘साहेब आपल्या हातून कळत-नकळत काही चूक झाली आहे का? असेल तर आपण इथे नारळ देऊ या’ अशी विनंतीवजा सूचना केली. स्थानिक लोकांमध्ये या गोष्टी किती खोलवर रुजल्या आहेत, याचे दर्शन झाले.

चुंबकीय विस्थापन हे प्रकरण स्वस्थ बसू देत नव्हते, दगडातील चुंबकीय घटकांमुळे हे घडते आहे, हे जरी लक्षात आले असले, तरी नक्की काय हे जाणून घेण्याची धडपड चालू होती. भूगोल विषयातील नामांकित प्राध्यापक डॉ. श्रीकांत कार्लेकर यांची भेट घेतली. ते स्वतः या ठिकाणी आले. त्यांनीदेखील आश्चर्य व्यक्त केले. त्यांच्या मार्गदर्शनाखाली गोगटे जोगळेकर महाविद्यालयाच्या भूगोल विषयाच्या विद्यार्थ्यांच्या सहकार्याने या चुंबकीय विस्थापन क्षेत्राचा प्राथमिक नकाशा तयार करण्यात आला. त्यातून पुढे आलेले अनुमान आणखी कोड्यात टाकणारे निघाले. जांभ्या दगडात चुंबकीय विस्थापन दाखविणारी ही जगातील एकमेव जागा आहे हे आमच्या अभ्यासातून समोर आले आहे. कोकणाच्या भौगोलिक व पर्यटनदृष्ट्या ही फार मोठी उपलब्धी आहे, यात शंका नाही. येथील चुंबकीय विस्थापन, तसेच जागामालक नीलेश आपटे व त्यांचे कुटुंबीय आणि ग्रामस्थ, त्यांची मिळालेली साथ, तिथला परिसर हा अजून एका स्वतंत्र लेखाचा विषय आहे.

येथून आमचा पुढचा प्रवास होता (४) हातिवले-अणसुरे मार्गावरील जुवाठी-उपळे गावातील. या ठिकाणी मार्गदर्शन करणारे कोणीच नव्हते. ‘सातविणीच्या बुंध्याखाली’ एवढाच काय तो संदर्भ. सातवीण म्हणजे कातळ सड्यावर उंच वाढणारे एक झाड. या ठिकाणी एक मोठी चौकोनी आकाराची उठावाची भौमितिक रचना आहे. निवळी मार्गावरील रचनेसारखी. त्याच्या लगतच असलेली मातृदेवता असावी, अशी रचना लक्षवेधक आहे. आम्हाला या चित्राचा संदर्भ मिळाला होता. नोंद करत असताना एका लहानशा अपघातात जवळच असलेल्या तब्बल ३५ फूट लांब व २४ फूट रुंद अशा चित्ररचनेचा शोध लागला. ही रचना एका नजरेत सामावत नाही. या चित्ररचनेचा नकाशा तयार केल्यावर ती रचना एका उडणाऱ्या पक्ष्याची आहे हे लक्षात आले. एकंदर रचनेवरून हे चित्र ससाणा या प्रजातील पक्ष्याचे असावे, असे वाटते. तोंडात बोट घालायला लावणारे हे चित्र. या चित्ररचनेसोबत प्राणी, मासे, मनुष्याकृती वगैरे आठ-१० रचना या परिसरात आहेत.

या परिसरातील एक वेगळी प्रथा अनुभवायला मिळाली. ढोल-ताशा हा कोकणातील एक पारंपरिक वाद्य प्रकार. इथे दोन मेळ्यांमध्ये (गटांत) ढोल-ताश्यांच्या बोलातून स्पर्धा भरते. जाखडी नृत्यप्रकारात असणाऱ्या सवाल-जबाबसारखे सवाल-जबाब ढोल-ताश्यांच्या बोलातून एकमेकांसमोर ठेवले जातात. कोकणाची कला-समृद्धी दाखविणारा हा वाद्यप्रकार. (५) देवीहसोळ गावाच्या सड्यावर आर्यादुर्गा देवीचे मंदिर वसले आहे. उपळे येथे असलेल्या चौकोनी आकाराच्या मोठ्या रचनेसारखी, पण अत्यंत सुस्पष्ट रचना या मंदिराच्या परिसरात आहे. या चित्ररचनेच्या आजूबाजूला अस्पष्ट अवस्थेत आणखी काही रचना आढळून येतात.

मार्गशीर्ष वद्य अष्टमीला येथे उत्सव साजरा केला जातो. जवळच्या भालावली गावाची देवी पालखीतून आर्यादुर्गा देवीला भेटायला येते. भेटीपूर्वी देवीची पालखी मांडावर थांबते. हा मांड म्हणजे कातळ चित्रातील चौकोनी आकाराची उठावाची मोठी भौमितिक रचना. मांडावर पालखी ठेवल्यावर देवळातील गुरव त्या रचनेच्या मधोमध असलेल्या खड्ड्यावरील दगड बाजूला करून साप बाहेर काढून देवीवरून ओवाळून परत त्याला खड्ड्यात ठेवतो. हा साप देवीचे वाहन आहे, असे मानले जाते. या वेळी कोकणात आढळून येणारा अत्यंत धोकादायक आणि विषारी असा हा फुरसे नावाचा साप चावल्याची घटना आजतागायत एकदाही घडलेली नाही.

कातळचित्र आणि त्याच्याशी निगडित परंपरा असणारे हे एकमेव ठिकाण. लोकांशी झालेल्या बोलण्यातून तेथे असलेली रचना नक्की काय आहे याची माहिती कोणाला नाही, असे लक्षात आले. काही तरी वेगळे आहे, त्याचा देवतेशी संबंध असावा या विचारातून या ठिकाणी पालखी ठेवण्याची प्रथा सुरू झाली. या माहितीमुळे मुख्य रचनेच्या आजूबाजूला असलेल्या चित्रांची झीज होण्याचे कारणही समजले.

दरम्यानच्या काळात या शोधाच्या बातम्या स्थानिक वृत्तपत्रांतून प्रसिद्ध झाल्या. आकाशवाणी रत्नागिरी केंद्रावरून बातमीवजा वृत्त प्रसिद्ध झाले. ‘एबीपी माझा’ या वाहिनीवरून प्रसारण झाले. हा विषय बऱ्यापैकी सर्व लोकांपर्यंत पोहोचला. व्यक्तिगत चौकशी, वृत्तपत्रांतील बातम्या यातून नवीन संदर्भ हाती येऊ लागले. सगळेच संदर्भ बरोबर होते असे नाही; पण आपणहून पुढे येऊन माहिती द्यायच्या लोकांच्या प्रयत्नांना मान देणेही तेवढेच आवश्यक होते. शेकडो किलोमीटरची पायपीट चालू होती.

राजापूर तालुक्यातून मिळत असलेल्या संदर्भांबरोबर आता रत्नागिरी तालुक्यातून मिळालेल्या संदर्भांवर लक्ष केंद्रित केले. रत्नागिरी-पावस मार्गावर (६) गोळप सड्यावर चित्र आहे, यावर शिक्कामोर्तब झाले. येथे एका माकडाचे चित्र सापडले. त्याच्या बाजूला एक चौकोन अशी दोन चित्रे. निवळी-गणपतीपुळे मार्गावरील (७) करबुडे फाट्यापासून काही अंतरावर असलेल्या ठिकाणी गोपद्मसदृश भौमितिक रचनांचा समूह आढळून आला. आकाराने कमी-जास्त असल्या, तरी सर्व रचना एकसारख्या आहेत. या व्यतिरिक्त अन्य रचना येथे आढळून येत नाहीत. या भागाला गोनीचा कातळ म्हणून ओळखले जाते. धान्य वाहून नेणाऱ्या गाड्या या ठिकाणी जमिनीत रुतल्या, त्यांच्या चाकांचे उमटलेले हे ठसे, अशी आख्यायिका या चित्रपरिसराबाबत स्थानिक लोकांकडून सांगितली जाते. चित्रांचे आकार, त्यांचा पसारा पाहता आख्यायिका आणि चित्ररचना यांचा एकमेकांशी काही संबंध असावा, असे जाणवत नाही. काही गोलगोल रचना पाहून नंतरच्या कालखंडात ही आख्यायिका या चित्रांना चिकटली असावी, असे वाटले. एकाच प्रकारच्या रचना असलेले आतापर्यंतच्या शोधातील हे एकमेव ठिकाण.

एका अज्ञात व्यक्तीने दिलेल्या माहितीवरून मेर्वी गावाच्या सड्यावरील चित्ररचनांचा शोध लागला. पावस-पूर्णगड मार्गावर असलेले हे गाव. मिळालेल्या संदर्भानुसार, या गावातील मधुकर गुरव ठिकाण दाखविण्यास सोबत आले. चालता चालता माहिती घेण्याचे काम सुरू होते. काही तरी चित्रविचित्र खुणा आहेत, त्यांचा काही अर्थ लागत नाही, असे त्यांचे सांगणे. त्यांनी एक आख्यायिका सांगितली. कोणे एके काळी या गावातील एका व्यक्तीला एक अनाहूत तेजःपुंज माणूस भेटला. ‘तुला संपत्ती देतो,’ असे सांगून तो त्याला चित्रपरिसरात घेऊन आला. तेथे असलेल्या एका मोठ्या गुहेत त्यांनी प्रवेश केला. ही गुहा सोने-नाणे वगैरे गोष्टींनी भरलेली होती. गावातील त्या माणसाचा स्वतःवर विश्वास बसेना. ‘माझी अट पाळलीस, तर ही सगळी संपत्ती तुझी,’ असे सांगून ती तेजःपुंज व्यक्ती अंतर्धान पावली. घडलेल्या अनपेक्षित प्रसंगामुळे अवचितपणे त्याच्याकडून अटीचा भंग झाला. त्यानंतर एक मोठा आवाज होऊन ही गुहादेखील लुप्त झाली. त्या वेळी उठलेल्या खुणा म्हणजे तेथे असलेल्या चित्रविचित्र खुणा अशी ती गमतीशीर आख्यायिका होता.

बोलता बोलता चित्रपरिसरात पोहोचलो. काही रेषा कातळावर वाहून आलेल्या मातीखाली आपले अस्तित्व दाखवत होत्या. साफसफाई केल्यावर चित्रे स्पष्ट झाली. या चित्रांमध्ये गवा रेडा, हत्ती, डुक्कर, मगर अशा विविध प्राण्यांचा समूह आहे. या सगळ्या रचना जणू काही एकमेकांत गुंतल्या होत्या. त्यामुळे व्यवस्थित पाहिल्याशिवाय या रचना नक्की काय आहेत, हे समजणे जरा अवघडच. कदाचित याच बाबीमुळे काही चित्रविचित्र रचना म्हणून आजपर्यंत त्यांच्याकडे पाहिले गेले. एकंदर रचना पाहून गुरव यांनीदेखील आश्चर्य व्यक्त केले. एवढी वर्षे येथे वावरूनदेखील या रचना नक्की काय आहेत, हे आम्हाला माहीत नव्हते, अशी कबुली त्यांनी दिली.

रत्नागिरी तालुक्यातील गावखडी गावातील सड्यावर (१०) दोन ठिकाणे आहेत. एका ठिकाणी एक मनुष्याकृती व त्यासोबत वराह आणि हरीण वर्गातील प्राण्यांच्या रचना आहेत. या रचना पाहण्यासाठी मात्र नजर तयारीची असणे गरजेचे आहे. दुसऱ्या ठिकाणी वाघ, मासा या रचनांसोबत काही प्राण्यांच्या पावलांचे ठसे व एक अनाकलनीय रचना असा समूह मिळाला. या दुसऱ्या ठिकाणाला रेडे पावलाचा सडा म्हणून ओळखले जाते.

या गावातील रहिवासी डॉ. गजानन रानडे यांनी एक आख्यायिका सांगितली. गावखडी गावाची देवी आणि शेजारील कशेळी गावाची देवी या दोघी एकमेकांच्या सख्ख्या मैत्रिणी. या दोघींमध्ये काही कारणाने वितुष्ट आले. त्याचे पर्यवसान भांडणात झाले. गावखडी देवीचे वाहन रेडा आणि कशेळी देवीचे वाहन वाघ. या दोघांमध्ये जोराची मारामारी झाली. या भांडणात जी देवी हरेल, त्या देवीने दुसऱ्या देवीच्या अंगणात कायम पाणी भरायचे, अशी अट आपापसांत ठरली. भांडणात कशेळी देवीचा पराभव झाला. या भांडणाच्या दरम्यान रेडा व वाघाच्या पावलाचे ठसे उमटले, ते म्हणजे चित्रपरिसरात दिसणारे पावलांचे ठसे. ठरल्या अटीप्रमाणे कशेळी देवीने पाणी भरायचे होते. गावखडीच्या गुरववाडीमध्ये बारमाही जिवंत पाण्याचा एक झरा आहे. हा झरा म्हणजे कशेळी देवी पाणी भरते, असे म्हटले जाते. हीदेखील एक वेगळीच आख्यायिका.

एव्हाना आमच्याकडे पुरेशी माहिती गोळा होऊ लागली होती. शोधातून मिळालेल्या चित्ररचनांची छायाचित्रे आमच्याकडे होती. लोकांशी संवाद साधताना ही छायाचित्रे आम्ही दाखवू लागलो. असे काही बघितले आहे का, हे विचारणे सोयीचे जात होते. त्यात राजापूर तालुक्यात (११) साखरकोंबे गावाचा संदर्भ हाती लागला. गावात केलेल्या चौकशीतून काहीच हाती लागत नव्हते. एक दिवस अचानक त्या गावातील लहान शाळकरी मुलांची गाठ पडली. गावातील लोकांबरोबर चाललेला संवाद त्या मुलांच्या कानावर पडला. आम्ही दाखवलेली छायाचित्रे त्यांनी पाहिली आणि मुलांनी त्यांच्याबरोबर चलण्याचा आग्रह धरला. लहान मुलांमधील निरीक्षण करण्याच्या उपजत वृत्तीतून त्यांच्या नकळत आपल्याला काही वेगळी माहिती मिळून जाते, याचा अनुभव आम्हाला आमच्या निसर्गभ्रमंतीमध्ये वेळोवेळी आला होता. त्यामुळे त्यांचा आग्रह न मोडता आम्ही त्यांच्याबरोबर निघालो. सुमारे एक ते दीड किलोमीटर चालल्यावर त्यांच्या शाळेच्या मागच्या बाजूला थोडे दूर पोहोचलो. त्यांनी पुरवलेली माहिती अचूक होती. शाळेतील मुले धड रस्त्याने जातील तर शपथ, असे म्हणायची पद्धत आहे. वेड्यावाकड्या रस्त्याने शाळा गाठायची. या वेड्यावाकड्या मार्गावरील ही चित्रे. या ठिकाणाचा आमच्या शोधाचा दुसरा टप्पा शाळेतील शिक्षकांनी केलेल्या विनंतीनुसार शाळेची सुट्टी संपल्यानंतर घेण्यात आला.

शोधाच्या दुसऱ्या टप्प्यात त्या शाळेतील मुलांसह शिक्षकदेखील सहभागी झाले. तीन-चार ठिकाणी विभागलेला हा परिसर. या परिसरात मोठ्या चित्ररचनांचे प्रमाण खूप आहे. काही चित्ररचना शोधणे म्हणजे सुतावरून स्वर्ग गाठण्यासारखे होते. जेमतेम काही इंच दिसणारी रचना साफ केल्यावर तब्बल २४ फूट लांब व तेवढी रुंद अशी ही भली थोरली. एकंदर ३०-३५ चित्ररचनांचा हा तीन-चार ठिकाणी विभागलेला परिसर, जिथे मोठ्या माणसांना आपल्या गावात काय आहे हे माहिती नाही, तिथे लहान मुलांच्या उपजत निरीक्षणवृत्तीतून पुढे आलेला. असाच अनुभव आम्हाला पुढे आणखी एका ठिकाणी आला.


आडिवऱ्यानजीक (१२) रुढे गावाच्या सड्यावर काही चित्रे आहेत. दोन-तीन फूट लांबी-रुंदीचे काही तरी आहे, एवढ्या माहितीवर प्रवास सुरू झाला. प्रत्यक्षात त्या ठिकाणी अत्यंत आगळीवेगळी आणि भलीथोरली रचना मिळाली. एखादे यंत्र असावे, अशी तब्बल २२ फूट लांब व २२ फूट रुंद अशी उठावाची भौमितिक रचना. या रचनेच्या लगत वाघ, देवमासा वगैरे रचनेसह मातृदेवता असावी अशी रचना मिळाली.

या चित्ररचना शोधत असताना एका अनाहूत व्यक्तीने दिलेल्या माहितीनुसार याच सड्यावर आणखी दोन ठिकाणे मिळाली. एके ठिकाणी विविध प्राण्यांच्या सुमारे ३० चित्रांचा समूह मिळाला. दुसऱ्या ठिकाणी तब्बल ९.६ फूट लांबीच्या मनुष्याकृतीसह प्राणी, गोपद्म यांचा समूह मिळाला. संबंधित जागामालकासह आजूबाजूच्या गावांतील जवळपास सर्वच लोकांना आपल्या येथे असे काही आहे, याची माहिती नव्हती. पुढे काही दिवस औत्सुक्यापोटी ही मंडळी सड्यावर या चित्ररचना पाहण्यासाठी जात होती, हे विशेष.

निनाद तेंडुलकर यांनी लांजा तालुक्यातील भडे गावात काही चित्रे असल्याचा संदर्भ दिला. (१३). या गावात दोन-तीन वेगवेगळ्या ठिकाणी चित्ररचना आहेत. एके ठिकाणी तब्बल १४.६ फूट लांबीची मनुष्याकृती कोरलेली आहे. या मनुष्याकृतीला खवण्या किंवा खवळोबा म्हणून ओळखले जाते. कुठली तरी दैवी शक्ती या परिसरात आहे, असे स्थानिक लोकांचे सांगणे आहे. यातूनच या परिसरातील गडग्याचे (कम्पाउंड वॉल) काम अर्थवट सोडून दिले आहे. श्रद्धा म्हणा किंवा अंधश्रद्धा, त्यामुळे येथील काही रचना नष्ट होण्यावाचून वाचल्या हे विशेष. या ठिकाणी आमचे काम चालू असताना एका अनाहूत व्यक्तीने आणखी माहिती पुरविली आणि अधिक चौकशी करण्याच्या अगोदर निघूनही गेली. (१४) हे ठिकाण होते लावगण गावाच्या हद्दीत. तिथे सात-आठ रचना आहेत. तिथेदेखील निवळीसारखी मोठी भौमितिक रचना आहे. या रचनेतील वेगळेपणाकडे आमचे लक्ष वेधले गेले. यातून आमचा सर्व चित्ररचनांचा तौलनिक अभ्यास सुरू झाला. याच वेळी आम्ही परत एकदा खूप पूर्वीपासून पाहत आलेल्या (१५) निवळी, व रामरोड या ठिकाणी भेट दिली. निवळी येथे चौकोनी आकाराची उठावाची भौमितिक रचना आहे. हे चित्र अर्धेअधिक शेजारील मार्गाखाली नष्ट झाले आहे. (१६) रामरोड येथे पाच चित्ररचनांचा समूह आहे. यात मनुष्याकृतीसह दोन प्राणी आणि एका पक्ष्याची रचना आहे. रामरोड येथील चित्रपरिसर जागामालकाने आपल्या परीने जपला आहे. एका आख्यायिकेतून या परिसराला चोर कट्टा असे म्हणतात. एकदा गावात मोठी चोरी झाली. चोराने चोरीचा माल घेऊन पोबारा केला. गावाच्या महापुरुषाने चोराला अडवले व त्यांच्यात मारामारी झाली. महापुरुषाने त्या चोराला उचलून आपटले. तो चोर जमिनीत गाडला गेला. त्या चोराचा उमटलेला ठसा म्हणजे येथे असलेली मनुष्याकृती. या मनुष्याकृतीची एकंदर ठेवण परग्रहवासी असावा अशी आहे.

चित्ररचनांचा शोध घेतल्यावर मिळालेल्या माहितीचे संकलन, वर्गीकरण चालू होते. त्यातून असे लक्षात आले, की मिळालेल्या रचनांमधील प्राण्यांच्या रचना या वास्तवातील त्या प्राण्यांच्या आकाराशी मिळत्याजुळत्या आहेत. पक्षी या प्रकारातील काही रचना आकाराने खूपच भव्यदिव्य अशा आहेत. मनुष्याकृतींमध्ये वैविध्य आहे. भौमितिक रचनेतील आकारांमध्ये आणि विषयांमध्ये मोठ्या प्रमाणात वेगळेपण आहे. प्राणी, पक्षी, भौमितिक रचना, मनुष्याकृती या सर्व रचना खोदून निर्माण केलेल्या, रेषेने केलेल्या आहेत. भौमितिक रचनांचे आकलन होत नसले, तरी बाकी रचनांमधून ते चित्र नक्की कोणत्या प्राण्याचे, पक्ष्यांचे आहे, याचे आकलन नेटक्या पद्धतीने होते. मोठ्या चौकोनी आकाराच्या उठावाच्या भौमितिक रचना आणि त्यांच्या आजूबाजूला सापडणाऱ्या ढोपरापासून खाली पायाच्या रचना आपले वेगळेपण दाखवून देणाऱ्या अशा आहेत.

पूर्वीपासून ज्ञात रचना आणि हाती आलेल्या रचना यात असलेला फरक आणि वैविध्य तज्ज्ञ मंडळींच्या निदर्शनास आणले. त्यांनी आश्चर्य व्यक्त केले. चित्रांचा आकार, त्यातील वैविध्य, त्यांचा पसारा या गोष्टी त्यांच्यासाठीदेखील नवलाच्या होत्या. अर्थात त्यांच्याकडून अधिक माहिती मिळणे कठीण झाले हे मात्र नक्की.

जे आहे ते आगळेवेगळे आहे, पुरातन आहे हे मात्र निश्चित होते. म्हणून पुरातत्त्व ख्यात्याकडे धाव घेतली. त्या ठिकाणी भा. वि. कुलकर्णी हे अधिकारी होते. परंतु ‘हा माझा विषय नाही. त्यामुळे मी याबाबत काही माहिती देऊ शकत नाही,’ असे ते म्हणाले. आमची निराशा झाली; पण त्या प्रसंगातून या विषयाचा अधिक खोलवर अभ्यास करण्याची प्रेरणा मिळाली. तेथून सुरू झाला चित्ररचना शोधाबरोबर त्यांच्या निर्मात्याचा शोध.

शोध घेत असताना चित्ररचनांना असलेल्या धोक्यांबाबतदेखील अंदाज आला. पर्यटनाच्या अंगानेदेखील याचे महत्त्व, वेगळेपण आमच्या लक्षात आले. अभ्यास हा न संपणारा विषय आहे; पण त्यासाठी या गोष्टी टिकणे गरजेचे आहे. या विचारातून जिल्हाधिकाऱ्यांकडे धाव घेतली. सविस्तर माहितीवजा निवेदन त्यांना सादर केले. यासाठी जिल्हा पोलीस अधीक्षक शिंदे सर यांची मोलाची मदत मिळाली. जिल्हाधिकारी राधाकृष्णन यांनीदेखील सकारात्मक साथ दिली.
राजापूर विधानसभा मतदारसंघाचे आमदार राजन साळवी यांनादेखील हा विषय सांगितला. त्यांनी त्याला प्रतिसाद देऊन राजापूरच्या प्रांताधिकारी कार्यालयात तेथील अधिकारी व नागरिक यांच्याबरोबर एकत्रित बैठकीचे आयोजन केले. या बैठकीचे फलित म्हणजे राजापूरचे प्रांताधिकारी सुशांत खांडेकर, पुढे त्यांचे मिळालेले सहकार्य अप्रतिम असेच. आमच्या शोधकार्यासाठी आता आम्हाला रत्नागिरीच्या तीन सक्षम अधिकाऱ्यांची साथ लाभली होती.

एका बाजूला याविषयी अभ्यास करण्यासाठी इंटरनेटच्या माध्यमातून शोध सुरू झाला, तर दुसऱ्या बाजूला या विषयातील माहीतगार व्यक्तींचा शोध. त्याचबरोबर शोधादरम्यान मिळालेल्या ठिकाणांचा नकाशा तयार केला. त्या नकाशावरून एक आकृतिबंध तयार केला. इंटरनेटच्या माध्यमातून हाती माहिती मिळत होती; पण कोकणाशी संबंधित अगदीच त्रोटक माहिती उपलब्ध झाली. त्यात सिंधुदुर्ग जिल्ह्यात कुडोपी येथे असलेल्या चित्ररचना कळल्या. त्या चित्ररचनांवर सतीश लळीत यांनी काम केले असल्याचे निदर्शनास आले. त्यांच्याशी संपर्क साधून त्यांच्याकडून अधिक माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न केला; पण रत्नागिरी जिल्ह्यातील निवळी येथे असलेल्या रचनेपलीकडे आणखी काही माहिती मिळाली नाही. कुडोपी येथील रचना नवाश्मयुगीन कालखंडातील असाव्यात, असे मत त्यांनी त्यांच्या शोधनिबंधात नमूद केले आहे. गोवा राज्यात कुशावती नदीच्या किनाऱ्यावरदेखील अशा रचना असल्याचे इंटरनेटच्या माध्यमातून लक्षात आले.

एकीकडे अभ्यास चालू असताना नवीन ठिकाणांचे शोधकार्यदेखील चालू होते. ‘टिक्याच्या (ता. रत्नागिरी) कातळावर काही तरी आहे,’ एवढ्या संदर्भावर शोध सुरू झाला. गावात चौकशी करण्यासाठी गेलो असता एके ठिकाणी काही व्यक्ती भेटल्या. त्यांच्याबरोबर गप्पा मारताना आणखी एका ठिकाणाची माहिती समोर आली. (१७) हे ठिकाण होते उमरे गावाच्या सड्यावर. त्यांच्यातील माहिती देणाऱ्या व्यक्तीला त्याच्या वडिलांनी असे काही असल्याचे सांगितल्याचे आठवत होते. ‘हुमा बिलाच्या जवळ लावा तेम्बाच्या पलीकडे सातविनीच्या पल्याड’ असा हा संदर्भ. या संदर्भाच्या आधारे थोड्या शोधकार्यानंतर चित्ररचना मिळाल्या, ठिकाण निश्चित झाले. पहिला टप्पा पार पडला. परतीच्या वाटेवर सोबतची व्यक्ती सहेतुक आपल्यासोबत वावरत असल्याचा अंदाज आला. त्याचा खिसा गरम करून आणि ‘काही मिळाले तर कळवा’ असे सांगून निरोप घेतला. आमच्या एवढ्या प्रवासात अनुभवलेला हा असा पहिलाच प्रसंग.

या परिसरात तब्बल २४ चित्ररचनांचा समूह आढळून आला. यातील विशेष चित्र म्हणजे शार्क माश्याचे चित्र. गंमत म्हणजे ज्या ठिकाणाचा संदर्भ घेऊन पोहोचलो होतो, ते ठिकाण आजतागायत मिळालेले नाही.

निवळी गावडेवाडी येथे काही तरी आहे, अशी माहिती पुढे आली. (१८) गावडेवाडी परिसरात पोहोचलो, तेव्हा हा सर्व परिसर चिऱ्याच्या खाणींनी व्यापला आहे, हे निदर्शनास आले. थोडी माहिती घेण्याच्या प्रयत्नात एका वृद्ध माणसाची गाठ पडली. त्या व्यक्तीने शिल्लक चित्ररचना दाखवल्या. या रचनांमध्ये मोठी चौकोनी आकाराची उठावाची भौमितिक रचना, मातृदेवतासदृश रचना आणि विशेष म्हणजे तब्बल १५ फूट लांबीचा सर्प यासह एक वर्तुळाकार रचना आहे.

सुदैवाने शेजारी चालू असलेल्या चिरा खाणीचा मालक तेथे आला. या चित्ररचनांना धक्का लावू नका अशी विनंती आम्ही त्यांना केली. त्यांनीही प्राथमिक होकार दर्शवला. परतीच्या वाटेवर त्या वृद्ध माणसाने खंत व्यक्त केली. ‘आम्ही अभ्यासक आहोत,’ असे सांगून काही मंडळी या ठिकाणी पूर्वी येऊन गेली असल्याची माहिती दिली. परंतु पुढे काय? हे जपले पाहिजे वगैरे गोष्टी सांगतात; पण त्यावर कोणीच काही करत नाही. ही चित्रे पण लवकरच नष्ट होतील. बाकीच्या चित्रांसारखी. असे सांगून ‘तुम्ही स्थानिक काही करणार का,’ असा प्रश्न आमच्यासमोर मांडून ठेवला.

‘पुढे काय?’ या प्रश्नाचे उत्तर खरोखरच या ठिकाणाने सोडवले. काही महिन्यांनंतर या ठिकाणी काही पर्यटकांसोबत आलो असता चिरा खाणमालकाने आपला शब्द पाळला नसल्याचे लक्षात आले. चित्ररचनांपासून अगदी जवळ चिरा खाणीचे काम सुरू करण्यात आले होते. लगेच हा विषय जिल्हाधिकारी राधाकृष्णन यांच्याकडे पोहोचवला. त्यांनी तातडीने कारवाई करून खाणीचे काम बंद केले. तसेच अन्य कोठे असा प्रकार आढळून आला, तर संबंधित काम बंद करण्याच्या सूचना संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या. तसेच संबंधित कातळचित्रे ‘सात-बारा’वर नोंद करता येतील का, या दृष्टीने विचार करून, त्या ठिकाणची महसुली कागदपत्रे गोळा करण्याबाबतदेखील सूचना दिल्या. त्यामुळे कातळचित्र संरक्षणासाठी एक आश्वासक सुरुवात झाली.

येथे मिळालेल्या माहितीनुसार काही अभ्यासक भेट देऊन गेल्याचे पुढे आले. योगायोग कसा असतो… त्याचदरम्यान ‘जे. जे. स्कूल ऑफ आर्ट’चे प्राध्यापक मराठे यांची गाठ पडली. कला या दृष्टीने विचार केल्यास आढळलेली चित्रे, ती कोरण्याची पद्धती प्राथमिक अवस्थेत असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले आणि पुण्याच्या डेक्कन महाविद्यालयातील प्राध्यापक डॉ. श्रीकांत प्रधान यांचा संदर्भ दिला. त्यांना संपर्क साधून अधिक माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न केला. डॉ. अशोक मराठे, प्रधान सर व सुबोध शिवलकर ही टीम कोकणातील प्राचीन बंदरे या विषयावर काम करत असताना त्यांना एक-दोन ठिकाणी चित्ररचना आढळलेल्या होत्या. त्यांच्या बोलण्यातून व त्यांच्या प्रसिद्ध झालेल्या लेखातून पालशेत, निवळी व देवीहसोळ या ठिकाणांचा उल्लेख समोर आला.

गोगटे-जोगळेकर महाविद्यालयाची विद्यार्थिनी शुभांगी कोत्रे हिने कापडगावात चित्रे असल्याची माहिती दिली. आमच्या शोधात प्रत्येक ठिकाणी काही ना काही वेगळी रचना समोर येत होती. (१९) कापडगावातदेखील वेगळी रचना समोर आली. थोड्या वेगळ्या शैलीतील सुमारे १४ चित्ररचनांचा समूह या ठिकाणी आहे. येथे असलेले समुद्री कासवाचे चित्र आमच्या विचारांना वेगळी दिशा देऊन गेले. या चित्ररचनांपासून सुमारे एक किलोमीटर अंतरावर असलेल्या एका ठिकाणाला भुताचा सडा म्हणतात. लांबलचक पसरलेल्या सड्यावर मध्येच एक भाग काहीसा वेगळा आहे. गवताची एक काडीदेखील इथे उगवत नाही. ‘या भागावर भुताने घाण करून कुल्ले घासले. म्हणून या भागात काही उगवत नाही,’ अशी गावातील लोकांची धारणा आहे. विस्तीर्ण कातळसड्यावर काही भागात गवताची एक काडीदेखील उगवू नये, ही खरेच नवलाची गोष्ट आहे.


राजापूर तालुक्यात (२०) सोगमवाडी येथील चित्ररचना शोधत असताना त्या गावातील एका माणसाची मदत घेतली. त्याने त्यांचे देव जिथे पूजतात, त्या ठिकाणाचे दर्शनदेखील घडवून आणले. लेणे असावे असे हे डोंगराच्या एका कपारीत असलेले स्थान. याच्या बाजूला पाण्याचा एक ओढा आहे. या पाण्याच्या साठ्याला हे लोक देव मानतात आणि पूजा करतात. (२१) आडिवरे गावाजवळ कोंडसर खुर्द येथील रचनांमध्ये माकडाच्या रचनांचा समावेश आहे. याच पठारावर दुसऱ्या टोकाकडे असलेल्या (२२) राजवाडी वाडीखुर्दच्या सड्यावरील चित्रपरिसर शोधण्यासाठी गावाच्या माजी सरपंचांची मदत झाली. प्रत्येक ठिकाणी मिळणाऱ्या चित्रांमध्ये एखादे चित्र नेहमी नवीन कोडे निर्माण करत होते. इथेही तोच प्रकार. प्राण्याच्या पोटात मनुष्याकृती कोरल्याचे इथे आढळून आले. या परिसरात सात-आठ चित्ररचना आढळून आल्या. तेथील कथा अजून वेगळी. शेजारी चालू असलेल्या चिरा खाणीच्या परिसरात आणखी काही रचना आहेत हे नंतरच्या कालावधीत पुढे आले. राजापूरचे प्रांताधिकारी खांडेकर यांनी तातडीने लक्ष घालून ही चिरा खाण बंद केली. खांडेकर हे एक वेगळे व्यक्तिमत्त्व. राजापुरातील पर्यटनवाढीसाठी त्यांनी स्वतःहून पुढाकार घेतला. त्यांच्या पुढाकारातून नवदुर्गा दर्शन या वेगळ्या पर्यटनपूरक ट्रिपचे आयोजन करण्यात आले होते. अशा प्रकारचा कोकणातील हा पहिलाच पर्यटनप्रयोग होता. खांडेकरांनी कातळचित्रांबाबत त्यांच्या क्षेत्रात आढळून आलेल्या चित्रठिकाणांची कागदपत्रे गोळा करून कातळचित्रांची नोंद सात-बारा दप्तरी व्हावी, यासाठी प्रस्ताव तयार करून जिल्हाधिकाऱ्यांच्या मंजुरीसाठी पाठवून दिला. त्यांचे संपूर्ण सहकार्य आम्हाला वेळोवेळी लाभले.

पावसामुळे प्रत्यक्ष शोधाच्या प्रवासाला थोडी खीळ बसली. या कालावधीत चित्रांचे वर्गीकरण, मिळालेल्या ठिकाणांचा अक्षांश- रेखांशांच्या साह्याने एकत्रित नकाशा तयार केला. तज्ज्ञ लोकांकडून मिळालेली माहिती, या अगोदर काही ठिकाणांबाबत प्रसिद्ध झालेली माहिती याबाबत साकल्याने विचार झाला. ठाकूरदेसाई सरांमुळे एकंदर भौगोलिक रचनेचा अभ्यास करता आला. चित्रांच्या वर्गीकरणाच्या वेळी प्राणिशास्त्रातील मित्रांची मदत घेतली. त्यातून रचनेतील प्राणी नक्की कोणते हे जाणून घेणे शक्य झाले. त्यातून चित्ररचनेमध्ये मिळालेले सर्व प्राणी हे जंगलातील (वाइल्ड) आहेत, यावर शिक्कामोर्तब झाले. निवळी येथील मोठ्या चौकोनी आकाराच्या भौमितिक रचनांसारख्या रचना अन्यत्रही आढळून आल्या. त्या रचना प्रथमदर्शनी सारख्या दिसत असल्या, तरी त्यात खूप फरक आहे. आजपर्यंत मिळालेल्या संदर्भानुसार, यापूर्वी फक्त निवळी, देवीहसोळ, उमरे व बारसू याच ठिकाणी तज्ज्ञ लोकांनी भेटी दिल्या असल्याचे आढळून आले. त्यातून त्यांनी काढलेल्या अंदाजांचा पुरेसा मेळ आमच्या शोधात आढळलेल्या रचनांशी होत नसल्याचेदेखील लक्षात आले. उदा. बारसूच्या सड्यावर ज्या चित्ररचनेला तज्ज्ञ लोकांनी भेट दिली आहे, त्यांनी तिथे असलेल्या एका रचनेला दिशादर्शक चिन्ह असे संबोधले आहे. प्रत्यक्षात ते दिशादर्शक चिन्ह नसून, ती वाघळी माशाची चित्ररचना आहे.

एकंदर चित्ररचनांच्या ठिकाणचा पसारा लक्षात आला. त्यावरून आणखी कोठे चित्ररचना असू शकतील, याचा अंदाज बांधून चौकशी सुरू केली. मिळालेली माहिती कार्यक्रम, छायाचित्र प्रदर्शन या माध्यमातून लोकांपर्यंत घेऊन जाऊ लागलो. वेगवेगळ्या माध्यमांतून अधिकाधिक माहिती गोळा करण्याचा प्रयत्न चालूच होता. आलेल्या अनुभवांतून शोधपद्धतीतदेखील थोडा बदल केला. सरकारदरबारी थोडा अधिक प्रयत्न चालू केला. पुढे येत असलेल्या माहितीतून भारतात अन्यत्र असलेल्या अशा प्रकारच्या चित्ररचनांपेक्षा वेगळ्या रचना, त्यांची निर्मितीची पद्धत यातील फरक स्पष्ट होऊ लागले. वृत्तपत्रे, शाळा, महाविद्यालये, वेगवेगळ्या संस्था यामध्ये केलेल्या कार्यक्रमांतून कातळ-खोद-चित्रे हा शब्द सर्वांपर्यंत पोहोचला. नाही म्हटले तरी काही प्रमाणात जागरूकता निर्माण करण्याच्या आमच्या प्रयत्नांना यश आले.

पाऊस कमी होताच शोधमोहिमेच्या पद्धतीत केलेल्या बदलानुसार चौकशी सुरू झाली. (२३) गणपतीपुळे रस्त्यावरील चवे-देऊड या गावाच्या सड्यावर चित्रे असावीत, असा आमचा अंदाज त्याच गावच्या विलास काळेंकडे बोलून दाखवला. त्याला त्यांनी प्रतिसाद देऊन माहिती घेतली आणि खरोखरच त्या गावाच्या सड्यावर चित्रे असल्याचे निश्चित झाले. या ठिकाणी १४-१५ चित्ररचनांचा समूह आहे. यातील १८ फूट लांबीची एकशिंगी गेंड्याची चित्ररचना आमच्या विचारांना वेगळी दिशा देऊन गेली. एकशिंगी गेंड्याचे वास्तव्य सध्या अखंड जगात फक्त आसाममध्ये आहे. मग त्याची चित्ररचना इथे कशी काय? अद्याप कोकणात त्याच्या अस्तित्वाचे पुरावे नाहीत.

(२४) परचुरी गावाच्या सड्यावर १५-१६ चित्ररचनांच्या ठिकाणी एक आख्यायिका ऐकायला मिळते. मुलीच्या लग्नाचे संपूर्ण वऱ्हाड कोवळ्या कातळात बुडाले. त्यांच्या उमटलेल्या खुणा म्हणजे इथली कातळचित्रे. चित्ररचनांमध्ये दिसणाऱ्या आकारांना ‘ही दागिन्याची पेटी, हातातला नारळ,’ वगैरे पद्धतीने वृद्ध मंडळींकडून ओळखले किंवा सांगितले जाते.

इथल्या आख्यायिकेने आम्हाला नक्कीच विचारात टाकले. कातळात एखादी गोष्ट कशी काय गाडली जाऊ शकेल. कोवळा कातळ म्हणजे काय? मग प्रवास सुरू झाला आख्यायिका उलगडण्याचा. कोकणात कातळ सर्वत्र असला, तरी त्याच्या काठिण्यात फरक आहे. कोठे तो फार कडक आहे, तर कोठे नरम. याला या कातळाच्या निर्मितीमागील प्रक्रिया कारणीभूत आहे. जेथे कोवळ्या कातळात वऱ्हाड बुडाले, ही आख्यायिका ऐकायला मिळते, तिथे असलेला कातळ नरम आहे. मग अशा बुडणे, गाडणे अशी आख्यायिका असलेल्या ठिकाणची भौगोलिक परिस्थिती परत एकदा नजरेखालून घातली. आणि अशा प्रकारच्या आख्यायिकांमागील गर्भितार्थ उलगडला. या चित्ररचना आणि आख्यायिका यांचा कोणताच संदर्भ एकमेकांशी नाही. कातळसड्यावर काहीशा गूढ वाटणाऱ्या या रचना पाहून त्याभोवती वेगवेगळ्या आख्यायिका गुंफल्या गेल्या; पण या आख्यायिकांतून तेथील भौगोलिक परिस्थिती काय असावी, याची माहिती मिळते.

परचुरीच्या या सड्यावर असताना आमची एका हरहुन्नरी व्यक्तीशी गाठ पडली. ती व्यक्ती अनोळखी तर नव्हतीच. आमचा चांगला मित्र मिलिंद खानविलकर. उक्षी ग्रामपंचायतीच्या सरपंचपदाचा भार सध्या या व्यक्तीच्या खांद्यावर आहे. आम्ही त्याला सूचना केली, ‘तुमच्या गावाच्या सड्यावरदेखील अशा रचना आहेत. एकत्र शोध घेऊ.’ उक्षी गावाचा सडा परचुरी, करबुडे, जांभरुण यांच्या मधला. या सर्व ठिकाणी चित्ररचना आहेत. (२५) जांभरुण गावाच्या सड्यावर तब्बल ४२ चित्ररचनांचा समूह आहे. वेगवेगळ्या आकाराच्या आणि शैलीच्या मनुष्याकृती हे या ठिकाणचे वैशिष्ट्य. या परिसराला राक्षसाची जाल असे म्हणतात.

करबुडे, जांभरुण, परचुरी येथील माहिती मिलिंदला दिली. रचना कशा शोधायच्या, याची कल्पना त्याला दिली. खरेच अत्यंत उत्साही अशा मिलिंदचा दोन दिवसांतच निरोप आला. (२६) उक्षी गावाच्या सड्यावर चार-पाच ठिकाणी मिळून सुमारे चाळीसेक चित्ररचना या ठिकाणी आहेत. एके ठिकाणी फक्त लहान-मोठ्या भौमितिक रचना आहेत. दुसऱ्या ठिकाणी असलेली चित्ररचना लक्षवेधक आहे. तब्बल १८ फूट लांब व तेवढी रुंद अशी हत्तीची रचना.

मधल्या कालखंडात आमचे सरकारदप्तरी प्रयत्न चालूच होते. रत्नागिरी जिल्हा परिषदेच्या तत्कालीन मुख्य कार्यकारी अधिकारी प्रेरणा देशभ्रतार यांनी आमच्या कामाचे महत्त्व ओळखून, ग्रामीण पर्यटन विकास योजनेमध्ये कातळचित्रांच्या ठिकाणांचा समावेश केला आणि आपल्या परीने संपूर्ण मदत देऊ करण्याचा प्रयत्न केला. तसे पाहता वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून आम्हाला मिळत असलेले सहकार्य वादातीत होते. अशी दुर्मीळ उदाहरणे असतात. त्यात आम्ही एक होतो.

देशभ्रतार यांनी घेतलेला पुढाकार सर्वांपर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न केला. त्याला उक्षीचे सरपंच मिलिंद यांनी खऱ्या अर्थाने चांगला प्रतिसाद दिला आणि कातळचित्राच्या ठिकाणाकडे जाण्याचा मार्ग करून घेतला.

दरम्यानच्या काळात आमच्या पाठी उभ्या असलेल्या या तिन्ही वरिष्ठ अधिकाऱ्यांची बदली झाली. अर्थात सरकारदरबारी नवा गडी नवे राज्य सुरू झाले. ते प्रयत्न एका बाजूला चालू असताना दुसरीकडे शोधकार्य चालूच होते.

प्र. के. घाणेकर यांच्यामुळे ‘महाराष्ट्र अनलिमिटेड’ या अंकातून लेख प्रसिद्ध झाला. आशुतोष बापट यांची सरांमुळे ओळख झाली. त्यांची मदत सातत्याने होत होती आणि आहेही.

एका बाजूला अप्रतिम सहकार्य मिळत होते, तर काही प्रसंगी वाईट अनुभवदेखील पदरात पडत होते. इतिहास या विषयात अनेक वर्षे काम करणाऱ्या एका संस्थेने आमच्याकडून माहिती घेऊन वेगळी चूल मांडण्याचा प्रयत्न केला. काही जणांनी स्वतःच्या नावावर खपविण्याचा प्रयत्न चालविला. या गोष्टीचे नक्कीच वाईट वाटले. ज्ञानदानाच्या क्षेत्रातील या गोष्टीची खंत वाटली.

शोधात नवनवीन ठिकाणांची भर पडत होती. (२७) कोतापूर, (२८) शेडे, (२९) नाटे, (३०) विखारे गोठणे, (३१) जयगड, (३२) कुरतडे, (३३) मासेबाव, (३४) रावारी, (३५) हर्चे, (३६) भडे, (३७) बेनी, (३८) कोळंबे अशी विविध ठिकाणे. प्रत्येक ठिकाणची चित्रे वेगवेगळी. काही ना काही कोडे निर्माण करणारी आणि आख्यायिकांपासून दूर. या सर्व प्रवासात आलेल्या अनुभवातून मिळालेल्या सर्व ठिकाणांचा परत एकदा साकल्याने विचार केला. त्यातून चवे देऊड पंचक्रोशीत (३९) चवे गावी नवीन ठिकाण समोर आले. देवीहसोळ परिसरात अनेक चित्ररचना मिळाल्या. बारसूच्या सड्यावर आणखी खूप मोठा खजिना हाती लागला. यापूर्वी अभ्यासकांनी मांडलेली मते, गृहीतके यांचा नव्याने अभ्यास करणे गरजेचे आहे, हे आमच्या शोधकार्यात आलेल्या अनुभवातून स्पष्ट झाले आहे. बारसूच्या सड्यावर मिळालेल्या खजिन्याने ही गोष्ट अधोरेखित केली आहे.
कातळचित्रांच्या शोधाबरोबर आम्ही आडवळणावरचे कोकण जवळून अनुभवत होतो. जैवविविधतेतील वेगवेगळ्या घटकांची ओळख होत होती. पक्षी कुळातील वेगवेगळ्या प्रजातींची भर पडत होती. कास पठाराएवढे सौंदर्य कोकणातील या कातळसड्यांवर अनुभवायला मिळत होते. कोकणातील जैवसाखळीतील सर्वोच्च स्थानी असलेल्या बिबट्याचे दर्शन हे आमच्या दृष्टीने नेहमीचेच झाले.

गोवळ गावच्या टिपऱ्या, जैतापूर येथील खारवी समाजातील समई नृत्य, राजापुरातील शिमगोत्सवातील रोम्बाट ही आगळीवेगळी प्रथा, धनगर समाजातील गजा नावाचा नृत्यप्रकार, भडे गावातील निखाऱ्यावरून चालण्याची प्रथा, अशा वेगवेगळ्या गोष्टींच्या माध्यमातून कोकणची समृद्धी अलगद उलगडली जात होती.


उक्षीतील ग्रामस्थ आणि सरपंचांच्या पुढाकाराने झालेले कातळ-खोद-चित्राचे संरक्षण
शिंदे सरांचे शब्द अगदी खरे होते. कोकण विभागीय आयुक्त म्हणून डॉ. जगदीश पाटील यांची बदली झाली. त्यांना या विषयात विशेष रुची आहे. त्यांच्या येण्याने सरकारी पातळीवर काहीशा रेंगाळलेल्या विषयाला गती मिळाली. त्याचदरम्यान रत्नागिरीचे प्रांताधिकारी अमित शेडगे यांची गाठ पडली. त्यांच्याकडून लाभत असलेल्या मदतीबाबत सांगण्यास शब्द अपुरे पडतील. खरे सांगायचे झाले, तर ते आमच्या टीमचे एक सहकारी बनून गेले आहेत. योगायोग म्हणजे महाराष्ट्र पुरातत्त्व विभागाचे संचालक म्हणून तेजस गर्गे यांच्याकडे कारभार सोपविला गेला. गर्गे सर स्वतः पुरातत्त्व शास्त्रज्ञ. महाराष्ट्र राज्य शासनाच्या या विभागाला याच विषयातील व्यक्ती संचालक म्हणून तब्बल २२ वर्षांनी लाभली. आमच्या शोधाच्या दृष्टीने ही खूप महत्त्वपूर्ण अशी बाब. त्यांची गाठभेट झाली आणि कातळचित्र या विषयाला ‘बुलेट ट्रेन’ची गती मिळाली. कातळचित्रांच्या ठिकाणांना राज्य संरक्षित स्मारकाचा दर्जा मिळविण्यासाठी त्यांनी स्वतःहून पुढाकार घेतला आणि आजही ते सर्वतोपरी प्रयत्न करत आहेत.

मधल्या कालखंडात या विषयाकडे पर्यटकांचा ओघ वाढू लागला आहे. सरकारदरबारी ही चित्रठिकाणे संरक्षित करण्यात येणाऱ्या तांत्रिक अडचणींबाबत सातत्याने विचारविनिमय चालू आहे. त्यात अमित शेडगे यांच्याबरोबर लोकसहभागातून ठिकाणांचे संरक्षण करण्यासाठी पुढाकार घ्यावा, असे सूचित केले. त्याला त्यांनी प्रतिसाद दिला. याही वेळी मिलिंद खानविलकर उभे राहिले आणि बघता बघता लोकसहभागातून उक्षी येथील गजराज संरक्षित झाले. जागामालक, स्थानिक ग्रामस्थ यांना सरकारी अधिकाऱ्यांची साथ लाभली, तर काय होऊ शकते, याचे एक जिवंत उदाहरण उभे राहिले. चित्र संरक्षित झाल्यापासून अवघ्या काही महिन्यांत सुमारे सात हजारांहून अधिक पर्यटकांनी या ठिकाणी भेट दिली आहे. स्वाभाविकच त्याचा परिणाम स्थानिक व्यापारी वर्ग व जनतेला झाला आहे. अखंड महाराष्ट्रात प्रागैतिहासिक ठिकाण लोकसहभागातून संरक्षित झाल्याचे हे पहिलेच उदाहरण. हा मान उक्षी या लहानशा ग्रामपंचायतीने पटकावला. मिलिंद खानविलकर यांच्यासारखे सरपंच सर्वत्र लाभले तर कोकणाचा शाश्वत विकास होण्यास वेळ लागणार नाही.


कातळ चित्रांबरोबर आमचा मंदिरांवरही अभ्यास होत होता. मंदिरातील वेगवेगळ्या गोष्टी समोर येत होत्या. आज जगाच्या पाठीवर पोहोचलेले दशावतारी खेळे सर्वांना ज्ञात आहेत; पण कधीतरी लुप्त पावलेल्या या कलेला आडिवऱ्याच्या महाकाली मंदिरात पुनरुज्जीवन मिळाले आहे, हे कीती लोकांना ठाऊक आहे? गणेशगुळ्यातील लक्ष्मी- दामोदरची दुर्मिळ मूर्ती, गोवळमधील ब्रह्मदेवाची अत्यंत सुरेख मूर्ती, साटवलीमधील गुप्तकालीन विष्णूमूर्ती, अशी एक ना दोन… कोकणाचे वैभव असणारी ही मंदिरे.

मध्यंतरीच्या कालखंडात आणखी एक ठिकाण मिळाले. (४१) कशेळी. राजापूर तालुक्याच्या उत्तर टोकावर वसलेले हे गाव. या गावाच्या सड्यावर एका भल्या थोरल्या चित्ररचनेशी आमची गाठ पडली. ‘अबब’ हाच शब्द त्या रचनेला योग्य. सुमारे ५० फूट लांब व ४० फूट रुंदीची ही हत्तीची चित्ररचना. ही चित्रे नीटनेटकी पाहायची झाल्यास आपल्याला हवेत किमान ५० फूट जावे लागते. या रचनेमध्ये विविध प्राणी, पक्षी, जलचरही कोरलेले आहेत. तब्बल ८० चित्रांचा एकत्रित समूह. भारतातील या प्रकारातील एखाद्या प्राण्याचे हे सर्वांत मोठे चित्र. या परिसरात एकंदर १२५ चित्ररचना आहेत. आजपर्यंत आमच्या शोधात मिळालेला हा सर्वांत मोठा समूह. या चित्ररचनेने परत एकदा वेगळ्या विचारांना गती दिली.


चित्ररचनांना राज्य संरक्षित स्मारकांचा दर्जा देण्यासाठी आवश्यक बाबींची पूर्तता करण्यासाठी पुरातत्त्व विभागाकडून ऋत्विज आपटे यांची नेमणूक करण्यात आली. आपटे स्वतः पुरातत्त्व अभ्यासक. त्यांच्यासोबत महसूल खात्याच्या अधिकारीवर्गाबरोबर सर्व ठिकाणांचा एकत्रित सर्व्हे सुरू झाला. या सर्व्हेदरम्यान आपटे यांच्या ज्ञानाचा आम्हाला अधिक उपयोग झाला. तत्कालीन मानवाने वापरलेली दगडी हत्यारे आम्हाला मिळाली. कातळ-खोद-चित्रांच्या कालनिश्चितीसाठी थोडीफार का होईना, एक दिशा मिळाली.

या सर्व्हेदरम्यान माणसांच्या वेगवेगळ्या तऱ्हा पाहायला मिळाल्या. सर्व्हेवेळी उमरे गावात गेलो. त्या वेळी गावातील ४०-५० माणसे या ठिकाणी उपस्थित होते. त्यांचा विरोध होता. ‘आमची जागा आहे. आम्ही देणार नाही,’ वगैरे गोष्टींनी सुरुवात झाली. ती माणसे आम्ही सांगत असलेल्या गोष्टी ऐकून घेण्याच्या मनःस्थितीमध्ये नव्हती. ही चित्रे पुरातन नाहीत, असे त्यांचे सांगणे होते. त्यांच्याबरोबर झालेल्या संवादात त्यांच्याच बोलण्यातून ही चित्रे कोणी कधी निर्माण केली हे माहिती नसल्याचे निदर्शनास आणून दिले, तेव्हा कुठे राग थोडा शांत झाला. या चित्रांचे महत्त्व, त्यामुळे गावाला होणारा फायदा या बाबींची कल्पना दिली. कोकणी माणसाची टिपिकल ओळख ही मंडळी बाजूला ठेवतील अशी अपेक्षा. उक्षीचे उदाहरण सर्व लोकांनी समोर ठेवले, तर या चित्रांचे संरक्षण नक्कीच शक्य आहे. त्या दृष्टीने आमचे प्रयत्न चालूच आहेत.

शोधप्रवास आजही चालूच आहे. रत्नागिरी जिल्ह्यासोबत सिंधुदुर्ग जिल्ह्यातदेखील आमचा प्रवास सुरू झाला आहे. आजमितीस ५२ गावांतून सुमारे ९० ठिकाणी १२००हून अधिक कातळ-खोद-चित्ररचना शोधण्यास यश मिळाले आहे. खरे म्हणजे प्रत्येक ठिकाणावर एक स्वतंत्र लेख होईल.

या चित्ररचना का कोरल्या गेल्या? त्यामागील उद्देश काय? चित्ररचनेतील गेंडा, पाणघोडा हे प्राणी कधी काळी कोकणात अस्तिवात होते का? त्यांचा कालखंड कोणता? या रचना एकाच कालखंडात कोरलेल्या आहेत की वेगवेगळ्या? देव, धर्म, भाषा या गोष्टी त्या माणसाला माहिती होत्या का? मानवी उत्क्रांतीचे गूढ आणि अगम्य प्रश्न घेऊन ही कातळचित्रे आपणासमोर उभी आहेत.

कातळ-खोद-चित्रांमधील विविध रचना, त्यांचे आकार, शैली मिळालेली दगडी हत्यारे यांचा विचार करता या रचना निर्माण करणारा मानव भटका होता. अन्न मिळविण्यासाठी तो पूर्णपणे शिकारीवर अवलंबून होता. शेतीचे ज्ञान त्याला अवगत झाले नव्हते असे दिसते. यातून या रचना इसवी सन पूर्व १० हजार ते १२ हजार या कालखंडातील असाव्यात, असा अंदाज तज्ज्ञ लोकांनी व्यक्त केला आहे. अश्मयुगीन कालखंडातील या रचना भारताच्या प्रागैतिहासिक कालखंडावर नव्याने प्रकाश टाकण्यात महत्त्वपूर्ण ठरणार आहेत. अर्थात अधिक सखोल अभ्यासाची आणि अधिक पुराव्यांची गरज आहे. त्या दृष्टीने आमचा प्रवास चालू आहे.

एक महत्वाआहची बाब म्हणजे या शोधाची दखल बीबीसी, दी हिंदू, लाइव्ह इंडिया, हिस्टरी डॉट कॉम यांसारख्या जगातील अग्रगण्य प्रसारमाध्यमांनी घेतली आहे. त्यामुळे अन्य देशांतील तज्ज्ञ, पर्यटकही कोकणाकडे वळू लागले आहेत. कातळ-खोद-चित्रांचा शोध, संरक्षण व संवर्धन या आमच्या विषयाला आता योग्य बळ मिळू लागले आहे. आमचा हा प्रवास पूर्णपणे तन, मन, धन अर्पून चालू आहे. आजपर्यंत एक नया रुपयाचीही मदत संस्था, सरकार किंवा व्यक्ती अशा कोणाकडूनही मिळालेली नाही. हे मुद्दाम लिहायचे कारण, की महाराष्ट्र सरकारने २४ कोटी रुपयांची घोषणा केली आहे; पण ती फक्त घोषणा आहे. कोकणाच्या सांस्कृतिक व आंतरराष्ट्रीय पर्यटनाच्या दृष्टीने हा अमूल्य ठेवा जपण्यासाठी जपण्यासाठी सर्वांच्या साथीची गरज आहे.

कातळचित्रांच्या शोधात आम्हाला फक्त ती चित्रेच मिळाली, असे नव्हे, तर आडवळणावरील कोकणाचे खरेखुरे सुंदर रूप आमच्यासमोर उलगडले. माणसांच्या स्वभावांचे अंतरंग उलगडले, कातळचित्रे म्हणजे फक्त चित्रांचा अभ्यास नव्हे. तो अभ्यास आहे पुराशास्त्राचा, माणसाच्या उत्क्रांतीचा, भौगोलिक गोष्टींचा, जैवविविधतेतील वेगवेगळ्या घटकांचा. भौतिक आणि रसायनशास्त्राचा. म्हणूनच खऱ्या अर्थाने सर्वांगीण असा हा विषय आहे.

संपर्क : ९४२२३ ७२०२०, ९४२३२ ९७७३६

ई-मेल : bhairisbud@gmail.com

(साप्ताहिक कोकण मीडियाच्या २०१८च्या दिवाळी अंकात हा लेख प्रसिद्ध झाला होता.)

pudhari.news
सिंधुदुर्ग : वाघबावली येथील कातळशिल्पावर नवा प्रकाश; थक्क करणारी माहिती आली समोर
पुढारी वृत्तसेवा
9–11 minutes
Sindhudurg News
वाघबावली येथे दोन वर्षांपूर्वी सापडलेले कातळशिल्पPudhari Photo

Published on: 

16 Jan 2025, 6:49 pm

Updated on: 

16 Jan 2025, 6:49 pm

देवगड : दोन वर्षांपूर्वी देवगड तालुक्यातील साळशी येथे उभ्या लँटराईट जातीच्या दगडावरील काही जंगली प्राण्यांची कातळचित्रे इतिहास संशोधन मंडळाच्या संशोधकांना सापडली होती. तेथून परतत असताना संध्याकाळच्या अंधारात शिरगाव येथील वाघबावली नावाच्या ठिकाणी एक नवे कातळशिल्प सापडले होते. त्याविषयीचा आपला रिसर्च पेपर पुरातत्व अभ्यासक रणजीत हिर्लेकर यांनी भारतीय- मूर्तीशास्त्र आणि स्थापत्य संशोधन परिषदेच्या पाचव्या आंतरविद्याशाखीय राष्ट्रीय अधिवेशनात सादर केला.

पुणे येथील सिंहगड इन्स्टिट्यूटच्या श्रीमती काशीबाई नवले कॉलेज ऑफ आर्किटेक्चर येथे भारतीय मूर्तीशास्त्र व स्थापत्य संशोधन परिषदेचे दोन दिवसीय पाचवे राष्ट्रीय अधिवेशन नुकतेच पार पडले. या परिषदेला देशभरातील अनेक राज्यांमधील संशोधकांनी आपले शोधनिबंध सादर केले. त्यामध्ये पुरातत्व अभ्यासक रणजित हिर्लेकर यांनी आपला शोधनिबंध सादर केला. त्यावेळी सत्रप्रमुख म्हणून आर. एच. कुलकर्णी व डेक्कन कॉलेजचे डॉ. श्रीकांत गणवीर हे उपस्थित होते.

हिर्लेकर म्हणाले, शिरगाव येथील कातळशिल्प समतल करण्यासाठी कलाकाराने कोणते साधन वापरले असेल? कसल्याही लोखंडी हत्याराविना असे अचूक कोरीव काम करणे अवघड आहे. हे चित्र काढण्यासाठी माणसाला भूमितीची व गणितीय ज्ञानाची आवश्यकता आहे? त्याविना अशी भौमितिक चित्र कोरणे कसे शक्य व्हावे? असे अनेक प्रश्न उपस्थित करीत आपले निष्कर्ष मांडले. या कातळशिल्पाचा कर्ता चांगलाच प्रगत मानव असला पाहिजे. हे कातळशिल्प द्विमीतीय चित्रकलेकडून त्रिमितीय शिल्पकलेच्या दिशेने मानवाचा सुरू असलेला प्रवास अधोरेखित करते. अशात-हेचे वर्तुळ कोरण्यासाठी कलाकाराला भूमितीय गणिताचे ज्ञान आवश्यक आहे. अंक गणिताचीही माहिती असायला हवी. मोजपट्टी वापरण्याचे ज्ञान आवश्यक आहे. अन्यथा इतके मोठे चित्र कोणत्याही साधनाविना, गणिताविना काढणे अशक्य आहे. वाघाच्या आकाराविषयीचे शरीरशास्त्रीय ज्ञान हवे. हे ज्ञान मिळविण्यासाठी तत्कालिन मानवाला आवश्यक ती स्थिरता व समृद्ध जीवन उपलब्ध असणे आवश्यक आहे, असे त्यांनी यावेळी सांगितले.

या अधिवेशनात आदित्य फडके व प्रा. अरविंद सोनटक्के यांच्या 'सुरसुंदरी देवांगना की नायिका' या पुस्तकाचे प्रकाशन झाले. यावेळी देशभरातील विविध राज्यातून आलेल्या मूर्ती व स्थापत्य कलेतील मान्यवर उपस्थित होते. या अधिवेशनातील इतिहास अभ्यासकांची पुरंदर तालुक्यातील भुलेश्वर महादेव मंदिराच्या अभ्यास दौऱ्याने या परिषदेची सांगता झाली. 

marathivishwakosh.org
प्रागैतिहासिक कला, भारतातील (Prehistoric Art in India)
Post author:माणिक वालावलकर
9–11 minutes
मानवाच्या सांस्कृतिक इतिहासाच्या प्रथम कालखंडास प्रागैतिहास अशी संज्ञा दिली जाते. त्याचे स्थूलमानाने प्रागैतिहास, आद्य इतिहास (protohistory) व इतिहासकाळ असे तीन प्रमुख कालखंड मानले जातात. प्रागैतिहास या संज्ञेचा प्रथम वापर डॅन्येल विल्सन यांनी केला. प्रागैतिहासिक काळाचे वैशिष्ट्य म्हणजे या काळात लेखनकला, स्थिर जीवन, धातूंचा वापर, योजनाबद्ध वसाहत वा अन्नोत्पादन यांचा पूर्णत: अभाव आढळतो. हा कालखंड सर्वांत मोठा असून त्याचा अभ्यास उत्खनित पुराव्यांद्वारे करावा लागतो. आद्य इतिहास कालखंडाचे लिखित पुरावे उपलब्ध असतात; परंतु त्यांचा उलगडा करता आलेला नाही, मात्र तत्संबंधी लिहिले गेले आहे. तर इतिहासकाळाचे लिखित पुरावे उपलब्ध असतात व ते वाचून त्याची उकल करणे शक्य असते. म्हणूनच इतिहासकाळाच्या पूर्वीचा काळ हा सर्वसाधारणपणे प्रागैतिहासिक काळ म्हणून ओळखला जातो. या तीनही संज्ञा काहीशा कृत्रिम आहेत. त्यांत प्रदेशपरत्वे फरक आढळतो. कारण त्या कालबद्ध वा प्रदेशनिबद्ध नाहीत. आजही पाषाणयुगीन जीवन जगणाऱ्या काही जमाती अस्तित्वात आहेत.

प्रागैतिहासिक कलेचे नमुने पुढील माध्यमांत विशेषत: आढळतात.

(१) गुंफांच्या भिंतींवर आणि प्रस्तराधारित कातळावर काढलेली चित्रे; (२) गुंफांच्या भिंतींवर आणि प्रस्तराधारित कातळावरील उत्कीर्णन; (३) प्राण्यांच्या मातीच्या मूर्ती; (४) अपोत्थित शिल्पे; (५) दगड, हाडे वा शिंगे यांसारख्या वस्तूंवर केलेली चित्रकारी अथवा उत्कीर्णन.

या काळातील गुंफा प्रामुख्याने मध्य भारतातील सिंगनपूर, आदमगढ, चक्रधरपूर, मिर्झापूर, हुशंगाबाद, लिखुनिया, भलदरिया, विजयगढ, पंचमढी इत्यादी ठिकाणी आढळतात आणि त्यांतून भित्तिचित्रे काढलेली आहेत. या गुंफांव्यतिरिक्त भीमबेटका येथे अतिप्राचीन प्रस्तर गुंफा असून त्यांचा शोध पुरातत्त्वज्ञ वि. श्री. वाकणकर यांनी लावला.


एडक्कल, वायनाड, केरळ येथील गुंफाचित्रशिल्प
भारतातील प्रागैतिहासिक गुंफाचित्रे प्रामुख्याने दोन प्रकारची आहेत. त्यांतील पहिला प्रकार म्हणजे रंगीत गुंफाचित्रे. अशी चित्रे प्रामुख्याने मध्य प्रदेशातील भीमबेटका, पंचमढी, मोदी, कावडी तसेच महाराष्ट्रातील अमरावती इत्यादी ठिकाणी आढळली आहेत. दुसरा प्रकार म्हणजे कमी उठावाची कोरीव (उत्कीर्णन) चित्रशिल्पे. या प्रकारची चित्रशिल्पे केरळमधील वायनाड जिल्ह्यातील एडक्कल येथील गुंफांमध्ये आढळली आहेत. १८९० मध्ये मलबारमधील पोलीस सुपरिंटेन्डेंट फ्रेड फॅसेट यांना शिकारी करता या भागात फिरताना या गुंफा दिसल्या. या गुंफांचा काळ नवाश्मयुग मानला जातो. एडक्कल या शब्दाचा अर्थ ‘दगडामध्ये’ असा आहे. या एका गुंफेचे दोन उपभाग पडले आहेत. डाव्या हाताच्या भिंतीवर मानवाकृती, हत्ती, जंगली कुत्रे, मोर व फुले व झाड यांचे चित्रण दिसते, तर उजव्या बाजूच्या भिंतीवर भौमितिक चिन्हे, काही शिकारीची दृश्ये दिसतात. या चित्रशिल्पांचे वैशिष्ट्य म्हणजे ही चित्रशिल्पे त्रिमितीचे दृश्य निर्माण करतात. अशी कोरीव चित्रे काही वेळा नदीकाठच्या कातळावर देखील आढळतात. गोव्यातील कुशावती नदीच्या काठी ऊसगाळमाळावयली (ऊसगळीमळ) येथे अशा प्रकारची कातळशिल्पे १९९३ साली पुरातत्त्वज्ञांना आढळून आली आहेत.


ऊसगळीमळ, गोवा येथील कातळशिल्प
रंगीत गुंफाचित्रांच्या बाबतीत मध्य प्रदेशातील भोपाळच्या दक्षिणेस ४५ किमी.वर विंध्य पर्वतरांगेतील भीमबेटका व त्याच्या आजूबाजूच्या भागातील चित्रांचे संशोधन महत्त्वपूर्ण मानले जाते. ‘भीमबेटका’ या शब्दाचा अर्थ तेथील आदिवासी भीमाचे आसन असा सांगतात. या गुंफा मध्य अश्मयुगकालीन असल्याचे पुरावे सापडले असले तरी त्यांचा वापर शुंग व गुप्त काळापर्यंत केला गेला असावा. येथील सु. १० चौ. किमी. परिसरात आठशे प्रस्तर गुहा असून त्यांपैकी पाचशे प्रस्तरालयांत चित्रे काढलेली आहेत. या प्रस्तर गुहांचे समन्वेषण पुरातत्त्वज्ञ वि. श्री. वाकणकर यांनी १९५५ मध्ये प्रथम केले; तथापि तेथे विस्तृत प्रमाणावर उत्खनन होईपर्यंत या गुहांकडे विद्वानांचे फारसे लक्ष गेले नाही. पुढे वाकणकर व व्ही. एन. मिश्र व सहकाऱ्यांनी उत्खनन केले. त्यात अश्मयुगीन उपकरणांपासून मध्याश्मयुगापर्यंतच्या काळातील विविध अवशेष उपलब्ध झाले. त्यामुळे तेथील चित्रवीथिकांच्या संशोधनास चालना मिळाली आणि विद्वानांचे लक्ष या प्रागैतिहासिक चित्रांकडे गेले. त्यांत मानवी उपकरणांची उत्क्रांती ज्ञात झाली; शिवाय उत्तर पुराणाश्मयुगीन मानवाच्या कवटीचा एक भागही मिळाला. तसेच शैलाश्रयी चित्रकलेचे भांडार आढळले. यांतील चित्रे एकाच काळातील नसून ती भिन्न कालखंडातील आहेत. त्यांतील अतिप्राचीन चित्रांचा काळ परस्पर उपलेपन पद्धतीच्या आधारे उत्तर पुराश्मयुग व मध्याश्मयुग असा गृहीत धरण्यात आला आहे. चित्रशैली, तंत्र व अध्यारोपन (सुपर इंपोझिशन) या आधारांवर वाकणकर यांनी या चित्रांचे सात कालखंड कल्पिलेले आहेत : (१) उत्तर पुराश्मयुग (२५००–१५००० इ.स.पू.), (२) मध्याश्मयुग (१५०००–६००० इ.स.पू.), (३) ताम्रपाषाणयुग (६०००–३००० इ.स.पू.), (४) नवाश्मयुग (३०००–२५०० इ.स.पू.), (५) आद्य ऐतिहासिक काळ (२५००–१८०० इ.स.पू.), (६) मध्य ऐतिहासिक काळ (१८००–९०० इ.स.पू.) आणि उत्तर ऐतिहासिक काळ (९००–५०० इ. स. पू.). येथील चित्रांचे विषय विविध आहेत. जन्मापासून मृत्यूपर्यंतच्या सर्व अवस्था त्यांत आढळतात. त्यामुळे तत्कालीन मानवाच्या जीवनपद्धतीची माहिती मिळते. चित्रवीथीत रानगवे, बैल, हत्ती, वाघ, हरिण, डुक्कर, गेंडा, नीलगाय, मोर, सांबर असे प्राणी असून क्वचित काही ठिकाणी पक्षीही चितारले आहेत. शिकारीचे अनेक प्रसंग आहेत. काहीची पुनरुक्ती आढळते. ही मानवांची गणचिन्हे असावीत, असे वाकणकर म्हणतात. दुसऱ्या एका चित्रात चार बालकांना जमिनीत पुरून त्यांच्या शवाभोवती एक पुरुष लाकडी कुंपण लावीत आहे व जवळच दोन महिला विलाप करीत आहेत असे चित्र काढले आहे. काही चित्रांत स्त्री-पुरुष दोघेही आहेत. शिकारीच्या चित्रात व्यक्तिगत वा सामूहिक प्रयत्न दाखविले आहेत. शिकारीच्या वा नृत्याच्या वेळी मुखवटे धारण करण्याची प्रथा असावी. मुखवटे व शिरीभूषणे कलाकुसरयुक्त असत. पाठीला टोपली वा गाठोडी बांधून अन्नसंकलनासाठी भटकणाऱ्या स्त्रियांची चित्रे वैशिष्ट्यपूर्ण आहेत. याशिवाय युगुले, मातृकादेवी, सुफलता व प्रजनन यांची प्रतीकात्मक चित्रे, गर्भवती संततीपालक स्त्रिया यांची चित्रे बरीच आहेत. तीन-चार चित्रे कामक्रीडेविषयीची आहेत. स्त्री-प्रतिमानात बहुविध अलंकारांचे दर्शन घडते. येथील प्राण्यांचे चित्रण वास्तववादी असून मानवी आकृत्या एका विशिष्ट शैलीत चितारल्या आहेत. चित्रे एकरंगी, दुरंगी व बहुरंगी असून पिवळा, लाल, तपकिरी व काळा या रंगांचा सर्रास वापर आढळतो. चित्रे काढण्यासाठी विविध प्रकारचे नैसर्गिक खनिज रंग वापरले गेले होते. हिरव्या रंगासाठी टेरा व्हेर्तासारखे (Terra verta) मृद्खनिज वापरले गेले. सर्वांत जुनी चित्रे हिरव्या रंगाची आहेत. तर मँगेनीज हे जांभळट रंगासाठी वापरले गेले. काही चित्रे चुनखडीपासून मिळणाऱ्या पांढऱ्या रंगांनी रंगवलेली आहेत. तर काही चित्रे रंगवताना गैरिक (Hematite) या दगडापासून मिळणाऱ्या लाल रंगाचा व त्याच्या पिवळ्या, नारंगी, तपकिरी छटांचा वापर करण्यात आला आहे. बहुतांश चित्रे लाल रंग व त्याच्या छटांची आहेत. चित्रे रंगवण्यासाठी तागाच्या झाडाच्या काठीचा उपयोग केला गेला असावा. या दीर्घ कालखंडावरील संशोधनादरम्यान वाकणकर यांना विविध काळातील जवळपास वीस शैली सापडल्या. गुहांत काही लघु-अश्मास्त्रे सापडली असल्यामुळे मध्याश्मयुगीन मानव या गुहांत वसती करून राहत असावा. येथे एकूण १६ शैलाश्रयात (रॉक शेल्टर) चार विद्यापीठांनी केलेल्या उत्खननांत तेरा मानवी सांगाडे मिळाले. त्यांतील एक सांगाडा भारतातील मानवी अवशेषांतील सर्वांत प्राचीन असावा, असा पुरातत्त्ववेत्त्यांचा कयास आहे; कारण याच्या गळ्यात शहामृगाच्या अंड्याचे मणी आहेत.


भीमबेटका येथील गुंफाचित्र
येथील चित्रशैलीविषयी यशोधर मठपाल यांनी काही निष्कर्ष मांडण्याचा प्रयत्न केला आहे, ते असे : या चित्रांची एकूण धाटणी रेखात्मक असून गतिमानता हा या चित्रांचा स्थायीभाव आहे. तांत्रिक दृष्ट्या या शैलीचे चार प्रकार संभवतात : एक, खडूसारख्या शुष्क रंगांची क्रेयॉन चित्रशैली, दोन, ओली पारदर्शक रंगचित्रशैली; तीन, ओली अपारदर्शक किंवा चिकणरंग (टेंपेरा) चित्रशैली आणि चार, तुषाररंग (स्प्रे-कलर) चित्रशैली. यांपैकी क्रेयॉन ही चित्रशैली भारतात क्वचित आढळते.

दक्षिण फ्रान्स अथवा उत्तर स्पेनमधील प्रागैतिहासिक मानवाच्या मानाने भारतातील प्रागैतिहासिक मानवाचे वास्तव्य अधिक काळ गुफांमध्ये होते, असे दिसते. त्यामुळे आधीच्या काळात चित्रे गुंफेच्या तोंडाजवळ काढत. नंतर ही चित्रे गुंफेमध्ये खूप आतल्या भागात काढलेले दिसतात. या गुफांच्या जवळ माणसांना व प्राण्यांना उपयुक्त अशी पाणवठ्याची जागा व प्राण्यांच्या चराऊ कुरणांची उपलब्धता दिसते. या सगळ्या वातावरणाचा एकंदरीत परिणाम म्हणजे पाणवठ्यावर आलेल्या प्राण्यांची शिकार करणे सहज शक्य होत असावे. यांतील बहुतांश गुंफा कडक ऊन, पाऊस आणि थंडी यांपासून संरक्षण व्हावे म्हणून दक्षिणाभिमुख आहेत.

गुंफाचित्रांमध्ये सर्वांत जास्त प्राण्यांशी संबंधित चित्रे आहेत. काही प्रमाणात मानवाकृती व वेगवेगळी चिन्हेही रेखाटलेली दिसतात. छोट्यांत छोटी चित्रे पाच सेंमी.ची मुंगुसासारख्या प्राण्यांची, तर मोठ्यांत मोठी चित्रे दोन मीटर उंच रानगवा अथवा हत्तीसारख्या प्राण्याची आहेत. प्राण्यांमध्ये रानगवे, माकडे, काळविट, कोल्हे, चित्ते, तरस, रानडुक्कर, मगरी इत्यादी प्राण्यांचे चित्रण आढळते. काळविटांच्या प्रजातीतील नीलगाई, चिंकारा, हरणाच्या प्रजातीतील ठिपक्यांची हरणे, चितळे, बाराशिंगे, सांबर इत्यादींचे बारकाव्यासहित चित्रण यात दिसते. छोट्या प्राण्यांमध्ये ससे, साळींदर, जळू, खारी, कासव, सरडे, बेडूक, विंचू, मधमाशी इत्यादी दिसतात. गरुड, गिधाडे, बगळ्यांच्या विविध प्रजाती, करकोचे, पाणकोंबड्या इत्यादी पक्ष्यांची चित्रणेदेखील आढळतात.

मानवाकृतींच्या चित्रणामध्ये तत्कालीन जीवनशैलीचे चित्रण आढळते. ज्यात दिनक्रमाची, शिकारीची, प्राण्यांबरोबरच्या झटापटींची व मानवी समूहनृत्याची चित्रे आहेत. शिकार हा या मानवाच्या अन्नसंकलनाचा अविभाज्य भाग होता. त्याचप्रमाणे जंगली श्वापदांपासून स्वत:चे रक्षण हाही त्यामागे हेतू असे. त्यामुळेच शिकारीकरिता त्याने विविध हत्याराची निर्मिती केली. गुंफाचित्रांमधील शिकार दृश्यांच्या चित्रणात मानवाला प्राण्यांचे वाटणारे भय, प्राण्यांना मानवाचे वाटणारे भय, विविध हत्यारे इत्यादीचे चित्रण आढळते. निसर्गाचा कोप होऊ नये म्हणून जादूटोणादेखील मानव करत असावा.

प्रागैतिहासिक काळाच्या जीवनाचे पुरावे म्हणजे उत्खननात सापडणारे त्या काळातील विविध अवशेष ज्यांत मानवी सांगाडे, हत्यारे, वापरातील वस्तू इत्यादींचा समावेश केला जातो; परंतु गुंफा चित्रे ही तत्कालीन मानवाचा दिनक्रम, सभोवतालची सृष्टी, राहणीमानाच्या संकल्पना, श्रद्धा, मानसिकता, भावभावना व जीवन मूल्ये याचा संपूर्ण पट अभ्यासताना या दीर्घ कालखंडातील जीवनमानाच्या बदलत्या टप्प्यांचे दुवे सांधण्याच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण ठरतात.

समीक्षण : सु. र. देशपांडे

konkantoday.com
कोकणात प्रथमच कुंभवडे (राजापूर) येथे महापाषाणकालीन एकाश्मस्तंभांचा सतीश लळीत यांचा शोध
admin
6–8 minutes

रत्नागिरी : कुंभवडे (ता. राजापूर) येथील महापाषाण संस्कृतीकालीन एकाश्मस्तंभ स्मारके पुरातत्व संशोधक सतीश लळीत यांनी प्रथमच उजेडात आणली असून यामुळे कोकणच्या प्राचीन इतिहासावर नवा प्रकाशझोत पडणार आहे. कोकणातील या प्रथम शोधाची घोषणा सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पुरातत्व संशोधक आणि कातळ शिल्प अभ्यासक सतीश लळीत यांनी पुणे येथे ‘आय-सार्क’ राष्ट्रीय परिषदेत केली. भारतात महापाषाण संस्कृतीचा काळ साधारणपणे इसपू १५०० ते ४०० वर्षे मानला जातो.


पुणे येथील सिंहगड इन्स्टिट्यूटच्या श्रीमती काशीबाई नवले कॉलेज ऑफ आर्किटेक्चर येथे भारतीय मूर्तीशास्त्र व स्थापत्य संशोधन परिषदेचे (इंडियन स्क्लप्चर अँड आर्किटेक्चर रिसर्च कौन्सिल, आय-एसएआरसी) पाचवे राष्ट्रीय अधिवेशन १० व ११ रोजी झाले. या परिषदेत पुरातत्त्व संशोधक श्री. लळीत यांनी आपला याबाबतचा शोधनिबंध सादर केला. बनारस हिंदु विद्यापीठाचे प्रा. शांती स्वरूप सिन्हा सत्रप्रमुख आणि डॉ. अरविंद सोनटक्के अध्यक्ष म्हणून उपस्थित होते.


सिंधुदुर्ग येथील श्री. लळीत हे निवृत्त शासकीय अधिकारी असून कातळशिल्प अभ्यासक आहेत. ६ मे २००१ रोजी त्यांनी सिंधुदुर्गातील पहिल्या कातळशिल्प स्थळाचा शोध लावला. गेली २४ वर्षे ते यावर संशोधन करीत असून त्यांनी या विषयावर एक पुस्तकही प्रकाशित केले आहे.


श्री. लळीत यांना एका संशोधकीय सर्वेक्षणात कुंभवडे येथील गंभीरेश्वर मंदिराजवळ जांभ्या दगडाची एकूण सात एकाश्मस्तंभ स्मारके आढळून आली. ही स्मारके म्हणजे एकाच दगडातून खोदून काढून उभे केलेले उभे पाषाण आहेत. मानवी विकासाच्या वाटचालीतील एक महत्त्वाचा कालखंड म्हणजे महापाषाण संस्कृतीचा (मेगालिथिक कल्चर) काळ होय. भारतातील महापाषाण संस्कृतीची कालनिश्चिती अद्याप निर्णायक झालेली नसली तरी सर्वसाधारणपणे इ.स.पू. १५०० ते ४०० वर्षे हा काल महापाषाण संस्कृतीचा मानला जातो. या संस्कृतीमध्ये मोठ्या दगडी शिळांचा वापर केला गेल्याने ती जगभरात महापाषाण संस्कृती म्हणून ओळखली जाते.


एकाश्मस्तंभांना इंग्रजीत मेनहिर असे म्हटले जाते. महापाषाणकालीन संस्कृतीमध्ये मृत व्यक्तींचे दफन केल्यावर त्यांचे स्मारक म्हणून एकाश्मस्तंभ उभे केले जात असत. मोठे दगड (मेगालिथ) जमिनीत उभे पुरले जात असत. जगाच्या अनेक भागात असे एकाश्मस्तंभ आढळतात. अशी एकाश्मस्तंभ स्मारके इंग्लंड, आयर्लंड, फ्रान्स, झेक प्रजासत्ताक वगैरे देशात आढळली आहेत. महापाषाण संस्कृतीमधील एकाश्मस्तंभ स्मारके ही मानवनिर्मित सर्वात प्राचीन स्मारके मानली जातात. महाराष्ट्रात विदर्भातील चंद्रपूर, भंडारा जिल्ह्यात अशी एकाश्मस्तंभ स्मारके याआधी मोठ्या प्रमाणात सापडली आहेत. कर्नाटक, तेलंगण, आंध्र, तामिळनाडु, मणिपूर राज्यातही अशी एकाश्मस्तंभ स्मारके आढळतात.श्री. लळीत यांना कुंभवडे येथे एकूण ७ एकाश्मस्तंभ आढळून आले. ते गंभीरेश्वर मंदिर (गांगो मंदिर) परिसरात तीन गटात विभागले गेले आहेत.


सात स्तंभांपैकी पाच उभ्या स्थितीत असून दोन निखळून पडलेल्या आडव्या स्थितीत आहेत. मंदिरासमोरून नाणार फाटा- कुंभवडे -उपळे रस्ता जातो. या रस्त्यावर मंदिराकडे वळणाऱ्या फाट्यावर दोन स्तंभ आहेत. मध्यम आकाराचा एक स्तंभ उभा असून, दुसरा मोठ्या आकाराचा स्तंभ आडवा पडला आहे. याच रस्त्याने सुमारे तीनेशे मीटर पुढे गेल्यावर रस्त्याच्या कडेला पाण्याच्या टाकीजवळ एक मध्यम आकाराचा पाषाणस्तंभ उभ्या स्थितीत आहे. मंदिराच्या पश्चिम बाजूला सुमारे तीनशे मीटर अंतरावर असलेल्या एका मळ्यात एकूण चार पाषाणस्तंभ पहायला मिळतात. यापैकी दोन लहान आकाराचे, एक मध्यम आकाराचा तर एक मोठ्या आकाराचा आहे.

या चार पाषाणस्तंभापैकी लहान आकाराचा एक आडवा पडलेला असून तीन उभ्या स्थितीत आहेत. हे एकाश्मस्तंभ स्थानिक उपलब्ध असलेल्या जांभ्या दगडांमधून खोदून काढलेले आहेत. उभ्या असलेल्या सर्व पाषाणस्तंभांची दिशा पूर्व-पश्चिम आहे. सर्वात लहान एकाश्मस्तंभाची उंची २.५ फूट, रुंदी २ फूट व जाडी ५ इंच आहे. सर्वात मोठ्या एकाश्मस्तंभाची उंची सव्वाआठ फूट, रुंदी ३ फूट व जाडी १० इंच आहे.कोकणचा प्रागैतिहास अद्याप अज्ञात आहे. सुसरोंडी (गुहागर) आणि कोळोशी (कणकवली) येथील मानवी वसतिस्थाने असलेल्या गुहा या दोन अतिप्राचीन काळातील संदर्भांशिवाय पश्चिम किनारपट्टीवरील कोकण प्रदेशात अश्मयुगात मानवी वस्ती असल्याचे कोणतेही पुरावे सापडलेले नव्हते.

काही वर्षांपूर्वी साधारणपणे मध्याश्मयुगाच्या शेवटच्या व नवाश्मयुगाच्या काळातील कातळशिल्पे सिंधुदुर्ग व रत्नागिरी जिल्ह्यात सापडल्याने कोकणातील मानवी अस्तित्वाच्या वाटचालीतील एक महत्त्वाचा दुवा सापडला आहे. यावर्षी मला रत्नागिरी जिल्ह्यातील राजापूर तालुक्यात महापाषाण काळातील एकाश्मस्तंभ (मेनहिर) आढळले आहेत. कोकणात एकाश्मस्तंभ (मेनहिर) आढळल्याची ही पहिलीच घटना आहे, असा दावा सतीश लळीत यांनी केला आहे. कोकण प्रदेशातील प्रागैतिहासिक काळातील, प्राचीन काळातील मानवी संस्कृतींचा शोध घेण्यासाठी अत्यंत कमी साधने आणि संदर्भ उपलब्ध असल्यामुळे हा काळ यादृष्टीने अंधारयुग (डार्क एज) म्हणून ओळखला जातो; मात्र गेल्या काही वर्षांत गुहांची मानवी वसतिस्थाने, शिळावर्तुळे, कातळशिल्पे असे अनेक संदर्भ उजेडात येऊ लागले आहेत. यामुळे या अंधारयुगाची एकएक खिडकी किलकिली होऊ लागली आहे.


कुंभवडे (ता. राजापूर, जि. रत्नागिरी) येथील महापाषाणकालीन एकाश्मस्तंभांच्या (मेनहिर) या शोधामुळे या साखळीतील आणखी एक महत्त्वाचा दुवा मिळाला आहे, असे श्री. लळीत यांनी म्हटले आहे.आतापर्यंत कोकणात सापडलेली मानवी वसतिस्थाने, गुहा, दगडी शस्त्रे, शिळावर्तुळे, कातळशिल्पे व एकाश्मस्तंभ यांचे शास्त्रशुद्ध सर्वेक्षण, संशोधन व अर्थान्वयन होणे अतिशय आवश्यक आहे. यामुळे कोकण प्रदेशातील प्राचीन मानवी संस्कृतींच्या अस्तित्वावर नवा प्रकाश पडु शकेल. या सर्व ठिकाणांचे संरक्षण व जतन करण्यासाठी शासनाने ही ठिकाणे राज्य संरक्षित स्मारके म्हणून जाहीर केली पाहिजेत. अज्ञान, अनास्था, जमिनींची विक्री व विकास, खाणी, विविध प्रकल्प यात या पुरातत्व स्थळांचे नुकसान होण्याची किंवा ती नष्ट होण्याची शक्यता आहे.

एकंदरीत कुंभवडे येथील हे महापाषाणकालीन एकाश्मस्तंभ महापाषाण काळात पश्चिम किनारपट्टीवर वसलेल्या मानवी समुहांच्या, तत्कालिन संस्कृतींच्या चालीरिती, श्रद्धा, उपासनापद्धती यांच्या अभ्यासात महत्वाचा दुवा ठरणार आहेत, अशी खात्री श्री. लळीत यांनी त्यांच्या शोधनिबंधात व्यक्त केली आहे.दरम्यान, या परिषदेत राज्यासह देशातील संशोधकांनी आपले शोधनिबंध सादर केले. शोधनिबंध सादरीकरणासोबतच मंदिर स्थापत्य या विषयावर वास्तुरचनाकार ॲडम हार्डी (ब्रिटन), डॉ. शिखा जैन, डॉ. उज्वला पळसुले यांची तर मूर्तीशास्त्र, गुहाचित्रे व लेणी या विषयावर प्रो. दीपक कन्नाल, डॉ. शांतीस्वरुप सिन्हा, प्रा. आर.एच. कुलकर्णी, प्रा. उषाराणी तिवारी यांची व्याख्याने झाली. परिषद यशस्वी होण्यासाठी अध्यक्ष डॉ. श्रीकांत गणवीर, सचिव डॉ. शांता गीते, कोषाध्यक्ष डॉ. दत्ता हिंगमिरे, उपाध्यक्ष डॉ. नीतिन बावले, माजी अध्यक्ष डॉ. अरविंद सोनटक्के, श्रीमती काशीबाई नवले कॉलेज ऑफ आर्किटेक्चरचे प्राचार्य डॉ. सुधीर चव्हाण, निमंत्रक विभागप्रमुख डॉ. शोभन केळकर, आर्कि. नेहा मसलेकर, सहनिमंत्रक आर्कि. अमोल दहिवडकर, आर्कि. योगिता पंडित, प्रा. रामदास वसगडे, प्रा. रवींद्र राहीगडे, प्रा. नीतिन शिऊरकर, आर्कि. श्रुती दुधाणे यांनी विशेष परिश्रम घेतले. सिंहगड इन्स्टिट्यूटचे संस्थापक अध्यक्ष प्रा. एम. एन. नवले, संस्थापक सचिव प्रा. सुनंदा नवले, उपाध्यक्ष डॉ. रोहित नवले, उपाध्यक्ष डॉ. रचना नवले अष्टेकर यांच्या सहकार्यामुळे ही परिषद यशस्वी झाली.

राजापूरला अर्जुना नदीवरचा पूल पार करून डोंगर चढून धूतपापेश्वर पाहून अजून डोंगर चढून पठारावर आलो. या रस्त्याने याच्याआधी चार-पाच वेळा तरी मी गेलेलो होतो त्यामुळे रस्ता माहिती होता. पण मधल्या काळात कातळशिल्प सापडली होती. तसा अचानक एक बोर्ड मला रस्त्याच्या कडेला दिसला. मी माझ्या तंद्रीत होतो. हातात avenger सारखी दणकट गाडी होती. मी एकटाच होतो त्यामुळे कानात हेडफोन्स टाकून दुपारची वेळ होती त्यामुळे कोणाचा तरी शुद्ध सारंग, मधमाद सारंग ऐकत चाललो होतो. रस्त्याच्या कडेला असलेल्या त्या बोर्डकडे लक्ष गेलं पण त्यावर काय लिहिलं होतं ते मेंदूत रजिस्टर होईपर्यंत मी बराच पुढे गेलो. बराच पुढे गेल्यावर मला आठवलं की, मी बहुतेक 'कातळशिल्प' असं वाचलं. 



लगेच गाडी वळवली आणि त्या रस्त्यावरून आत शिरलो. हे सगळं संशोधन नुकतच सुरू झाल्यामुळे फार काही प्रसिद्ध झालेलं नाही. रस्त्यावर एक बोर्ड आहे तो सोडला तर आत कुठेही काहीही माहिती किंवा आडोसा वगैरे की, ज्यावरून कळेल की नेमकी शिल्प कुठे आहेत असं काही नाही. पण साधारण मूळ रस्त्यापासून दोन किलोमीटर आत हे शिल्प आहे. बरीच शोधाशोध केल्यावर मला ते शिल्प सापडलं. अजून या शिल्पांचा अर्थ लागायचा आहे. डेक्कन कॉलेजमधली टीम त्यावर काम करते आहेत. अशी शिल्प कोकणात आता खूप ठिकाणी सापडली आहेत. 





iyemarathichiyenagari.com
खोटले धनगरवाडी सड्यावर ३५हून अधिक कातळशिल्पांचा शोध · इये मराठीचिये नगरी
टीम इये मराठीचिये नगरी
8–10 minutes
खोटले धनगरवाडी सड्यावर ३५हून अधिक कातळशिल्पांचा शोध
June 6, 2022June 6, 202204102

खोटले धनगरवाडी सड्यावर ३५हून अधिक कातळशिल्पांचा शोध
‘लज्जागौरी’सदृश शिल्पाचे अस्तित्व: हा प्राचीन वारसा चिरेखाणींच्या विळख्यात : सतीश लळीत
खोटले धनगरवाडी परिसरात ३५ हून अधिक कातळशिल्पे
मानवाकृती, प्राणी, मासे, अमूर्त आकृत्यांचा समावेश
‘लज्जागौरी’सदृश शिल्प आश्चर्यकारक
कातळशिल्पे या आदिमानवाच्या पाऊलखुणा
चिरेखाणींपासुन कातळशिल्पांना धोका
काही कातळशिल्पे खाणींमध्ये नष्ट
वेळीच दक्षता न घेतल्यास प्राचीन वारसा नष्ट होणार
सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या पुरातत्व वैभवात भर घालणारी आणखी ३५हून अधिक कातळशिल्पे उजेडात आली आहेत. कसालपासुन अवघ्या दहा किलोमीटरवरील खोटले (ता. मालवण) गावच्या धनगरवाडी सड्यावर आढळलेल्या या शिल्पांमध्ये मनुष्याकृती, प्राणी, मासे, अमूर्त रचना यांचा समावेश आहे. विशेष म्हणजे येथे आढळलेले ‘लज्जागौरी’सदृश कातळशिल्प आश्चर्यकारक असून आधुनिक काळातील लज्जागौरी हे या प्रतिमेचे उन्नत रुप असावे, अशी शक्यता आहे. मात्र या सर्व कातळशिल्पांचे अस्तित्व या परिसरातील चिरेखाणींमुळे धोक्यात आल्याचे धक्कादायक चित्र समोर आले असून अनेक कातळशिल्पे चिरेखाणींमध्ये नष्टही झाल्याचे समोर आले आहे, अशी माहिती या कातळशिल्पांचा शोध लावणारे अभ्यासक व ‘घुंगुरकाठी, सिंधुदुर्ग’ संस्थेचे अध्यक्ष सतीश लळीत यांनी दिली.

आपल्या या नव्या शोधाबाबत माहिती देताना श्री. लळीत म्हणाले की, मी गेली २१ वर्षे जिल्ह्यातील कातळशिल्पांचे संशोधन व अभ्यास करीत आहे. अलिकडेच माझे ‘सिंधुदुर्गातील कातळशिल्पे’ हे पुस्तकही प्रकाशित झाले आहे. नवीन कातळशिल्पे शोधण्याचे प्रयत्न सातत्याने सुरु असताना खोटले येथील माळरानावर ‘वेताळा’चे चित्र कोरलेले आहे, अशी माहिती मिळाल्यावर मी व डॉ. सौ. सई लळीत अशा दोघांनी या परिसरात मोहिम आखली. या परिसरात राहणारे श्री. लक्ष्मण बाबु जंगले यांच्या मदतीने शोध घेतला असता खोटले आणि पोईपच्या सीमेवर एका टेकडीच्या उतारावरील झाडाझुडपांमध्ये जांभ्या दगडात कोरलेली मानवाकृती निदर्शनास आली. वास्तविक हे एक कातळशिल्प असुन येथील लोकमानस त्याला ‘वेताळ’ म्हणुन ओळखते. यासंदर्भात काही लोककथाही या भागात प्रचलित आहेत. या ‘वेताळा’ला नवसही बोलले जातात, अशी माहिती मिळाली.


‘वेताळा’चे हे कातळशिल्प पाहिल्यावर या परिसरात आणखी काही अशाच प्रकारची कातळशिल्पे असण्याची दाट शक्यता होती. तशी विचारणा करता काही ठिकाणी ‘पांडवांची चित्रे’ आहेत. लहानपणी आम्ही ती पाहिली आहेत. मात्र ती शोधावी लागतील, असे श्री. जंगले यांनी सांगितले. ते आणि याच परिसरातील दुसरे रहिवासी नारायण रामा मोडक यांच्या मदतीने सड्यावर शोध घेतला असता ठिकठिकाणी ३५ हून अधिक कातळशिल्पे आढळून आली. या सर्व शिल्पांमध्ये भरलेली माती काढून त्यांची स्वच्छता करुन मोजमापे घेण्यात आली.

या कातळशिल्पांमध्ये सहा मनुष्याकृती, तीन चतुष्पाद प्राणी, दोन मासे, गोलाकृती व अन्य १२ अमूर्त शिल्पे, एक शिल्पपट्ट किंवा मांड याचा समावेश आहे. यापैकी काही कातळशिल्पे झिजलेली असून काही अतिशय सुस्थितीमध्ये आहेत. अगदी सुरुवातीलाच २० फुट व्यासाचे एक वर्तुळाकृती कातळशिल्प नजरेला पडते. येथून अवघ्या काही फुटांवर एक मोठी चिरेखाण आहे. या ठिकाणाहून सुमारे अर्धा किलोमीटर पुढे गेल्यावर टेकडीच्या उतारावर झाडाझुडपांमध्ये एक सुस्पष्ट मानवाकृती दिसते. तिच्या शिराकडच्या बाजुला दगडांचा मोठा ढिग आहे. स्थानिक रहिवासी याला ‘वेताळ’ म्हणुन ओळखतात. अशीच मानवाकृती हिवाळे, कुडोपी येथेही आढळली आहे. याचठिकाणी एक गुहासुद्धा आढळली. मात्र आता ती मातीने भरली आहे. येथून आणखी सुमारे एक किलोमीटर परिसरात एका छोट्याशा टेकडीवर एकाच ठिकाणी विविध प्रकारची ३० कातळशिल्पे आढळून येतात. आमच्यासोबत असणाऱ्या स्थानिकांनीही ती प्रथमच पाहिली. या सर्व कातळशिल्पांमधील माती, गवत काढल्यानंतर ती स्पष्ट दिसु लागली. याठिकाणी वाघासारख्या प्राण्याची दोन चित्रे अतिशय महत्वपूर्ण आहेत, अशी माहिती श्री. लळीत यांनी दिली.

Katalshilp discovery in Khotale sindhudurg District by Satish Lalit
Katalshilp discovery in Khotale sindhudurg District by Satish Lalit
*’लज्जागौरी’सदृश शिल्प आश्चर्यकारक*
खोटले येथे आढळलेल्या एका कातळशिल्पाचे ‘लज्जागौरी’ किंवा मातृदेवतेच्या मुर्तीशी विलक्षण साम्य आहे. हे शिल्प आश्चर्यकारक आहे. लज्जागौरी ही सुफलनाचे आणि समृद्धीचे प्रतीक मानली जाते. जगभरात एक काळ मातृसत्ताक पद्धतीचा होता, असे मानले जाते. त्याकाळी ही संकल्पना रुजली असावी, असे एक मत आहे. शिवाय, स्त्रीच्या ठिकाणी असलेल्या उत्पत्तीच्या शक्तीमुळे तिला हे सन्मानाचे स्थान दिले असावे, असाही एक मतप्रवाह आहे. सिंधु संस्कृतीशी संबंधित उत्खननात लज्जागौरीच्या काही प्रतिमा सापडल्या आहेत. अनेक आदिवासी समुह या देवीची पूजा करतात. भारतात मध्य भारत, दख्खन, कर्नाटक, आंध्र भागात लज्जागौरीच्या मूर्ती, प्रतिमा सापडल्या आहेत. अमरावती येथे सापडलेली लज्जागौरीची संगमरवरी मूर्ती (सद्या चेन्नई वस्तुसंग्रहालयात आहे.) ही सातवाहन काळातील इ.स. १५० ते ३०० यादरम्यान कोरली असावी, असे तज्ञांचे मत आहे. इसवी सनाच्या सहाव्या ते बाराव्या शतकादरम्यान बदामी चालुक्य राजवंशाच्या काळातील अशा काही मूर्ती सापडल्या आहेत. लज्जागौरी ही देवता शिरविरहीत असते. डोक्याऐवजी कमळाचे फुल असते. ही देवी सुफलनाचे प्रतीक असल्याने ती जननस्थितीमध्ये दाखवली जाते. (Lotus headed Goddess in birthing posture) खोटले येथील हे कातळशिल्प आधुनिक काळातील लज्जागौरीशी विलक्षण साम्य दर्शवते. कदाचित आधुनिक काळातील लज्जागौरी हे या प्रतिमेचे उन्नत रुप असावे, अशी शक्यता आहे, असे मत श्री. सतीश लळीत यांनी व्यक्त केले आहे.

Katalshilp discovery in Khotale sindhudurg District by Satish Lalit
Katalshilp discovery in Khotale sindhudurg District by Satish Lalit
या सर्व परिसरात चिरेखाणींचे साम्राज्य पसरले आहे. या खाणींमध्ये कितीतरी ‘पांडवांची चित्रे’ नष्ट झाली असे स्थानिकांनी सांगितले. याचठिकाणी असणाऱ्या सुमारे २० फुट लांब व २० फुट रुंद कातळशिल्पावर चिरेखाणीतील खराब तुटके चिरे व माती टाकून दिल्याने ते अत्यंत महत्वपूर्ण कातळशिल्प मातीखाली गेले, असे स्थानिकांनी सांगितले. या चिरेखाणी अशाच अनिर्बंधपणे सुरु राहिल्यास भविष्यात यापैकी अनेक कातळशिल्पे काळाच्या उदरात गडप होण्याची शक्यता आहे. जिल्हा प्रशासनाने व महसुल खात्याने याची दखल घेऊन या परिसरात चिरेखाणींची परवानगी देताना खाणचालकांना कातळशिल्पांचे जतन करण्याची अट घालूनच परवानगी द्यावी, अशी मागणी श्री. लळीत यांनी केली आहे.

Katalshilp discovery in Khotale sindhudurg District by Satish Lalit
Katalshilp discovery in Khotale sindhudurg District by Satish Lalit
सिंधुदुर्ग व रत्नागिरी जिल्ह्यात जांभ्या दगडाच्या सडेपठारांवर आढळणारी ही कातळशिल्पे म्हणजे आदिमानवाच्या या परिसरातील वास्तव्याच्या पाऊलखुणा आहेत. या कातळशिल्पांची निर्मिती मध्याश्मयुग ते नवाश्मयुग (इसवीसनपूर्व २० ते १० हजार वर्षे) या काळात झाली असावी. या काळात मानव हा भटका शिकारी अवस्थेत होता. त्याला पशुपालन व शेतीचे ज्ञान नव्हते. कातळशिल्पे म्हणजे नेमके काय, त्यांचा कालावधी, ती कोरण्याचे उद्देश याबाबत आपण ‘सिंधुदुर्गातील कातळशिल्पे’ या ग्रंथात सविस्तर माहिती दिली आहे. जिज्ञासुंनी तो अवश्य वाचावा. अलिकडेच राज्य शासनाच्या पुरातत्व व वस्तुसंग्रहालयाने केंद्र सरकारमार्फत कातळशिल्पांना ‘जागतिक वारसा स्थळ’ म्हणुन मान्यता मिळावी असा प्रस्ताव ‘युनेस्को’ या जागतिक संस्थेकडे पाठवला होता. तो प्राथमिक स्वरुपात स्वीकारुन त्यांचा समावेश तात्पुरत्या यादीत करण्यात आला आहे. यामघ्ये सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुडोपी येथील कातळशिल्पांचा समावेश आहे. ही घटना केवळ जिल्ह्याच्याच नव्हे तर महाराष्ट्राच्यादृष्टीनेही भुषणावह आहे, असे श्री. लळीत यांनी सांगितले.

Katalshilp discovery in Khotale sindhudurg District by Satish Lalit
Katalshilp discovery in Khotale sindhudurg District by Satish Lalit
Related
Need of conservation of barren rocky or stony wasteland

सडे संवर्धन काळाची गरज
सड्यावर येणारा एकत्रित मोठा फुलोरा हा अनेक कीटक, फुलपाखरे, पतंग आणि पक्षी यांना मधुरस पिण्यासाठी आकर्षित करतो. ह्या वनस्पतींचे परागीभवन होण्यासाठी ही मधुरसाची बक्षिसी मोठ्या प्रमाणात दिली जाते. श्रावणात उन्ह पडू लागली की अनेक प्रकारच्या मधमाश्या आणि कीटकांची रेलचेल या सड्यावर दिसू लागते. प्रतिक मोरेपर्यावरण अभ्यासक दख्खनच्या विस्तीर्ण पठाराचा सह्याद्री…

August 25, 2021

In "फोटो फिचर"

satish-lalit-book-on rock carving in Sindhudurg District

कातळशिल्पांची अभ्यासपूर्ण माहिती असलेले पुस्तक
मराठी भाषेतील अशाप्रकारचे जिल्हास्तरीय कातळशिल्पांचा अभ्यासपूर्ण माहिती असलेले हे पहिलेच पुस्तक असून पुस्तकाच्या एकंदरीत मांडणीतून सिंधुदुर्गातील कातळशिल्पांचा उलगडत जाणारा प्रवास व त्यांचे महत्त्व लक्षात येते. स्मिता गीध कोकणातील विशेषतः सिंधुदुर्ग जिल्ह्यातील भौगोलिक परिस्थिती बघता तेथील जीवनशैली आणि प्राचीन इतिहासाबद्दल आपल्याला कायमच कुतूहल वाटत आले आहे. गेल्या काही वर्षांत तेथे सापडलेल्या…

May 11, 2023

In "संशोधन आणि तंत्रज्ञान"


नवीन पुस्तक














pudhari.news
Mystery Of Devache Gothane : ‘रहस्यमयी’ देवाचे गोठणे अन्‌ बारसूमध्ये असे आहे तरी काय? ज्याची चर्चा होतेय! (Video)
स्वालिया न. शिकलगार
6–7 minutes
पुढारी ऑनलाईन डेस्क : बारसूमधील कातळशिल्पांना राष्ट्रीय स्मारक म्हणून जाहीर करा, अशी मागणी होत आहेच. किंबहुना, कोकणातील अनेक कातळशिल्पांना जागतिक वारसा स्थान मिळण्यासाठी प्रयत्न सुरु आहेत. मुळात बारसू (ता. राजापूर) हे कातळशिल्प राज्य सरकारने राज्य संरक्षित स्मारक म्हणून घोषित केले आहेच. सोबतच सिंधुदुर्गातील कुडोपी, रत्नागिरीतील उक्षी, जांभरुण, कशेळी, बारसू, देवाचे गोठणे, निवळी, चवे देऊड, रुंधेतळी, देवी हासोळ अशी कातळशिल्पे आजदेखील अस्तित्वात आहे. ही दगडात कोरलेली शिल्पे मानवी उत्क्रांतीची साक्ष देतात. मासे, जलचर सृष्टी, प्राणी, माणसे आणि अनेक रहस्य़मयी कात‍ळशिल्पे जी कल्पना करण्याच्या पलिकडे आहेत. काही कातळशिल्पे जांभ्या दगडांमध्ये कोरली गेलेली आहेत. कोकणातील ही कातळशिल्पे जवळपास ४५ हजार वर्षांपूर्वीची असल्याचे म्हटले जाते. वरील कातळशिल्पांपैकी आज देवाचे गोठणे आणि बारसू येथील कातळशिल्पांबद्दल जाणून घेणार आहोत. देवाचे गोठणे येथील कातळशिल्पांना जर तुम्ही भेट दिली तर तुम्हाला विश्वास बसणार नाही. येथे एक आश्चर्यजनक घटना घडते, ज्याचा अनुभव तुम्ही प्रत्यक्षात घेऊ शकता.

बारसूतील कातळशिल्प
बारसूतील कातळशिल्प

कोकणातील कातळशिल्पे प्रागैतिहासिक आणि मध्याश्मयुगीन मानवाने कोरलेल्या शिल्पाकृती असल्यामुळे या ठिकाणांना खूप महत्त्व आहे. बारसू आणि देवाचे गोठणे ही दोन्ही कातळशिल्पे मध्याश्मयुगीन काळातील आहेत. देवाचे गोठणे आणि बारसू ही दोन्ही ठिकाणे कुतुहल निर्माण करणारी आहेत. पैकी देवाचे गोठणे या ठिकाणी तुम्ही एकदा का होईना भेट द्यायलाचं हवी. रत्नागिरीतील राजापूर तालुक्यात १) बारसू आणि २) देवाचे गोठणे ही दोन गावे आहेत. या दोन्ही ठिकाणी कातळशिल्प आहेत. 'रहस्यमयी' देवाचे गोठणे कातळशिल्प विलक्षण अनुभव देणारे ठरेल.

बारसूतील कातळशिल्प
बारसूतील कातळशिल्प

बारसूची कातळशिल्पे कुतूहल निर्माण करणारी

बारसू हे गाव तसे छोटे पण नारळ, पोफळी, आंब्याच्या झाडांनी वेढलेले. काजूची अनेक मळे, हिरवागार निसर्ग, पक्ष्यांचा किलबिलाट आणि नीरव शांतता अनुभवायला येते. कोल्हापूरपासून साडे तीन तासांचा प्रवास करत बारसूला पोहोचता येतं. जाताना बारसू नावाचे फलक दिसते. पण, त्या गावात न जाता, अलिकडेच डाव्या बाजूला कच्चा रस्ता गेला आहे. दोन किलोमीटर आतमध्ये हा रस्ता असून याठिकाणी चारचाकी आणि दुचाकीने कातळशिल्पांपर्यंत जाता येते. पण आजूबाजूला बऱ्याच किलोमीटर अंतरावर कोणत्याही सुविधा नसल्याने सोबतचं पाणी आणि खाऊ घेऊन जाणे सोयीचे ठरते.

बारसूतील कातळशिल्प
बारसूतील कातळशिल्प

बारसूच्या एका विस्तीर्ण पठारावर तीन ते चार ठिकाणी विविध आकृत्या कोरलेल्या आहेत. जांभ्या दगडांवर प्राण्यांची चित्रे, वाघ, ससा, छोटे-मोठे मासे, मानवी आकृती, समुद्र असे अनेक शिल्पे आहेत. अशी काही शिल्पे आहेत, जी समजण्यापलिकडे आहेत. ही शिल्पे आकाराने मोठी आहेत. तर काही आकृत्या आकाराने छोट्या आहेत. त्यातील काही शिल्पांचा अर्थ किंवा त्या आकृत्या नेमक्या कशाचा आहेत? हे पटकन लक्षात येत नाहीत. कातळशिल्पांचा अभ्यास करणारे अनेक अभ्यासक, तज्ज्ञ, इतिहासकार यावर संशोधन करताना दिसतात.

बारसूतील कातळशिल्प
बारसूतील कातळशिल्प

बारसूला कसे जाल?
कोल्हापूरपासून बारसूला जाण्यासाठी साडेतीन तासांचा कालावधी लागतो.

बारसूतील कातळशिल्प
बारसूतील कातळशिल्प

कोल्हापूर-गगनबावडा-अणुस्कुरा घाट-पाचाल रोड-रायपाटण-मुंबई गोवा हायवे-हार्डी ब्रीज-बारसू कातळशिल्प (petroglyphs of barsu)

बारसूतील कातळशिल्प
बारसूतील कातळशिल्प

'गूढ' देवाचे गोठणे कातळशिल्पाचे
अविस्मरणीय ठिकाण म्हणजे देवाचे गोठणे. हे एक छोटं खेडेगाव. मातीची कोकणी कौलारू घरं, मातीने, शेणाने सारवलेले विस्तीर्ण अंगण, समोर तुळस, हंबरडणारी गुरे, आंबा, काजू, फणस, सुपारी, कोकम, पळस, फुले, माडाची झाडे आणि त्यातून येणार चिवचिवाट असा निसर्ग इथे अनुभवायला येतो. या गावातून पठारावर जाणारी एक छोटी वाट आहे.


तुम्ही जाणार असाल तर गावातील एखाद्या व्यक्तीला किंवा मुलांना सोबत घेऊन या पठारावर जाऊ शकता. शक्यतो या लॅटेराईट पठारावर एकटे जाऊ नये. कारण भल्या मोठ्या पठारावर येथील कातळशिल्प शोधणे कठीण जाते.

देवाचे गोठणे
देवाचे गोठणे

गावातून पायवाट तुडवत अर्धा तासांच्या चढतीनंतर पठारावर पोहोचता येते. अंदाजे साडे सात ते ८ फूट माणसाची प्रतिमा येथे कोरलेली आहे. हे गूढ कातळशिल्पे पाहण्यासाठी हजारो पर्यटक, अभ्यासक याठिकाणी येतात. या मानवाच्या प्रतिमेवर विविध ठिकाणी होकायंत्र ठेवल्यानंतर उत्तर – दक्षिण अशी अशी दिशा स्थिर होत नाही. शिवाय होकायंत्र गोल गोल फिरत राहते. त्याचा व्हिडिओ लेखाच्या शेवटी दिलेला आहे.

file photo
file photo

या खडक चुंबकीय विसंगती दर्शवतो. या मानवाच्या पूर्ण प्रतिमेवरचं हे होकायंत्र काम करत नाही. मुळात चुंबकसूची (सुई) पृथ्वीच्या चुंबकीय उत्तर-दक्षिण दिशेने स्थिर होते. पण या प्रतिमेवर होकायंत्राची सुई कधी सुलट तर कधी उलट आपोआप गोल फिरत राहते.

भार्गव राम मंदिर
भार्गव राम मंदिर

या गूढ ठिकाणाचा अभ्यास करण्यासाठी अनेक संशोधक, इतिहास तज्ज्ञ या ठिकाणी येत असतात. या मानवाची प्रतिमा असलेल्या कातळशिल्पावरचं होकायंत्र उत्तर-दक्षिण स्थिर होत नाही. पण, या आकृतीपासून होकायंत्र बाजूला नेताच पुन्हा होकायंत्राची सूई दिशा दर्शवते.

सोलगावातून देवाचे गोठणेला जाता येते
सोलगावातून देवाचे गोठणेला जाता येते

या मानवाच्या पायाजवळ तर होकायंत्राची सुई अजिबात दिशा दाखवत नाही.

देवाचे गोठणेकडे जाणारा पूल
देवाचे गोठणेकडे जाणारा पूल

'देवाचे गोठणे'ला कसे जाल?
देवाचे गोठणे हे बारसूपासून नजीक आहे. बारसूपासून अर्धा तासाचे अंतर कापल्यानंतर देवाचे गोठणे या ठिकाणी जाता येते. सोळगाव देवाचे गोठणेला जाताना डाव्या बाजूना फलक दिसतील. शिवाय सोळगाव देवाचे गोठणेच कमानदेखील दिसेल. तिथून आतमध्ये जाता येईल. शिवाय काही अंतर पार केल्यानंतर पुन्हा डाव्या बाजूला एक ब्रीज असून भार्गव राम मंदिर दिसेल, त्या ठिकाणी गाडी पार्क करता येईल.

भार्गव राम मंदिर
भार्गव राम मंदिर

भार्गव राम मंदिर –
कोकणातील भार्गव राम मंदिर पाहण्यासारखे असून मोठे आहेत. सभोवताली छोटी-छोटी मंदिरे आहेत. या कौलारू मंदिरात खूप शांतता आणि थंड वातावरण आहे.


देवाचे गोठणेला जाताना फाट्यावर एका हॉटेल आहे, जिथे तुम्हाला उत्तम प्रकारचे जेवण, चहा, कॉफी, थंड पेये, नाश्ता मिळू शकतो.

भार्गव राम मंदिर परिसरातील अन्य मंदिरे
भार्गव राम मंदिर परिसरातील अन्य मंदिरे

आणखी काय पाहाल?
देवीहसोळ कातळशिल्पे, कशेळी, देवघळी बीच, कनकादित्य मंदिर, पूर्णगड (किल्ला), पावस देवस्थान.

नंदी
नंदी

विशेष म्हणजे अनेक परदेशी पर्यटक, अभ्यासक य़ाठिकाणाला भेट देतात. ती कातळशिल्पे कॅमेराबद्ध करतात. आपल्याला जर या ठिकाणांविषयी कुतुहल असेल तर एकदा या दोन्ही ठिकाणांना अवश्य भेट दिलीच पाहिजे!

देऊळवाडीतील भार्गवराम मंदिर
देऊळवाडीतील भार्गवराम मंदिर

lokmat.com
रत्नदुर्ग किल्ल्यावर सापडले आफ्रिकन पटखेळाचे कातळशिल्प
ऑनलाइन लोकमत
~2 minutes
रत्नागिरी : शहराजवळील रत्नदुर्ग किल्ला येथे साफसफाईवेळी आफ्रिकेमधील पारंपरिक पटखेळातील प्रकार मंकाळा खेळाचे कातळशिल्प आढळले आहे. गडकिल्ले संवर्धन प्रतिष्ठानतर्फे रत्नदुर्ग किल्ल्यावर साफसफाई करताना दीपगृह परिसरात हे शिल्प आढळल्याचे संशोधन अभ्यासक स्नेहल बने यांनी सांगितले.

हे पटखेळाचे चिन्ह सुमारे साडेतीनशे वर्षापूर्वीचे असून, प्रथमच असे रत्नदुर्ग किल्ल्यावर दिसल्याचा दावा बने यांनी केला आहे. मंकाळा हा आफ्रिकन लोकांमध्ये खेळला जाणारा पटखेळ आहे. कातळावर गोल आकाराचे खड्डे एका रांगेत हव्या असलेल्या पटांची संख्येमध्ये कोरून दोन सवंगड्यांमध्ये हा खेळ खेळला जातो. भारतात अनेक ठिकाणी याला गायचारा, पलंगुळी, अलगुळी आदी नावाने ओळखले जाते. तसेच खेळ सापडलेल्या ठिकाणी शिवपिंडीसारख्या आकाराचे दोन शिल्पही दिसली आहेत.

गडकिल्ले संवर्धन प्रतिष्ठानच्या कार्यामध्ये रत्नदुर्ग किल्ल्याचे बालेदार तन्मय जाधव व सक्षम शिंदे यांचीही मोलाची मदत झाली, असे स्नेहल बने यांनी सांगितले.



रत्नदुर्ग किल्ला परिसरातील आढळलेले मंकाळा पटखेळ १ फूट ९ इंच लांब असून, त्यावर १२ पट आहेत तर शिवपिंडी १ फूट लांब व ८ इंच रूंद आहेत. तसेच या ठिकाणी एक पूर्ण वर्तुळ असून, दुसऱ्या वर्तुळाच्या मध्यभागी रेषा असलेली तीन चिन्ह एकाच कातळावर कोरलेली दिसतात.

संशोधन होणे गरजेचे

मंकाळा पटखेळाची आढळलेली चिन्हे आफ्रिकन आहेत. त्यामुळे त्याकाळी आफ्रिकन प्रजातीचे लोक भारतात व्यापारासाठी व जलमार्गाने आले होते का, याबाबत अधिक संशोधन करणे गरजेचे असल्याचेही बने यांनी सांगितले.

कोंकण शैलचित्र – उक्षी
kevinstandagehotography द्वारा​ 14 मार्च, 2019 • ( एक टिप्पणी छोड़ें )
कोंकण शैलचित्र - उक्षी
कोंकण में अपने सप्ताहांत के दूसरे दिन हमने जिस दूसरे पेट्रोग्लिफ़ स्थल का दौरा किया, वह उक्षी में था। चावे डेवुड की तरह , यहाँ भी देखने लायक दो स्थल हैं, दोनों की खोज 2016 में हुई थी।

साइट 1
लैटेराइट पठार के एक विस्तृत विस्तार में सड़क के किनारे, शैलचित्रों की एक विशाल श्रृंखला स्थित थी, जिनमें से अधिकांश अमूर्त डिज़ाइनों से बनी थीं, लेकिन उनके निर्माण की कोई स्पष्ट संरचना नहीं थी। आपको ऐसा आभास होता है कि यहाँ चित्र अधिक बेतरतीब ढंग से बनाए गए थे, संभवतः कई अलग-अलग व्यक्तियों द्वारा लंबे समय में।

उक्षी पेट्रोग्लिफ्स
उक्षी पेट्रोग्लिफ्स
उक्षी पेट्रोग्लिफ्स
उक्षी पेट्रोग्लिफ्स
उक्षी पेट्रोग्लिफ्स
उक्षी पेट्रोग्लिफ्स
उक्षी पेट्रोग्लिफ्स
उक्षी पेट्रोग्लिफ्स
उक्षी पेट्रोग्लिफ्स
उक्षी पेट्रोग्लिफ्स
यह अगली तस्वीर मुझे काफ़ी दिलचस्प लगी। वहाँ पहुँचकर मुझे लगा कि यह बाहें फैलाए किसी मानव आकृति का एक और अमूर्त चित्रण है, लेकिन फ़ोटो को पोस्ट-प्रोसेस करते समय मैंने इस आकृति के "सिर" के आसपास कुछ और बारीकियाँ देखीं, अब मुझे पूरा यकीन हो गया है कि यह उड़ता हुआ एक पक्षी (हमिंगबर्ड?) है।

संभावित हमिंगबर्ड पेट्रोग्लिफ़ - उक्षी
मानव या पक्षी? – उक्षी पेट्रोग्लिफ्स
संभावित हमिंगबर्ड पेट्रोग्लिफ़ - उक्षी
हमिंगबर्ड ? – उक्षी पेट्रोग्लिफ्स
जहां तक अन्य अर्ध-पहचान योग्य छवियों की बात है, तो हमारे पास एक कंघी भी हो सकती है, तथा दो सिर और कंधों की रूपरेखा भी है, जो विपरीत सममिति के साथ एक-दूसरे के बगल में रखी गई है।



यहाँ की सबसे रहस्यमयी नक्काशी सबसे बड़ी भी है। हमें जो नक्काशी दिखाई दे रही है वह सिर का ऊपरी हिस्सा प्रतीत होता है, जिसमें दो बड़ी आँखें और नाक और भौंहों के बीच एक अमूर्त डिज़ाइन है। बेशक, अन्य लोग इस छवि के बारे में बिल्कुल अलग निष्कर्ष निकाल सकते हैं, लेकिन इसकी व्याख्या करना मुश्किल होगा।

सिर पर नक्काशी ? - उक्षी पेट्रोग्लिफ्स
सिर पर नक्काशी ? – उक्षी पेट्रोग्लिफ्स
सिर पर नक्काशी ? - उक्षी पेट्रोग्लिफ्स
सिर पर नक्काशी ? – उक्षी पेट्रोग्लिफ्स
सिर पर नक्काशी ? - उक्षी पेट्रोग्लिफ्स
सिर पर नक्काशी ? – उक्षी पेट्रोग्लिफ्स
अजीब बात है कि यह चित्र अधूरा सा लग रहा है। सप्ताहांत में मैंने जितनी भी नक्काशी देखीं, लगभग सभी "बंद" थीं, और मेरा मतलब है कि वे या तो पूरी तरह से जानवर थे या फिर अमूर्त डिज़ाइन नक्काशीदार रेखाओं से घिरे हुए थे (शायद इसके लिए कोई तकनीकी शब्द है!)। यहाँ डिज़ाइन अक्सर छोड़ दिया गया है, लेकिन शायद वह भी जानबूझकर किया गया था।

यह उन चित्रों में से एक है जिसे मैंने कंप्यूटर पर संवर्धित किया है:

रहस्यमय सिर जैसी नक्काशी की कंप्यूटर द्वारा उन्नत छवि - उक्षी पेट्रोग्लिफ्स
रहस्यमय सिर जैसी नक्काशी की कंप्यूटर द्वारा उन्नत छवि - उक्षी पेट्रोग्लिफ़्स
इन शैलचित्र स्थलों को देखने का एक आकर्षक पहलू यह है कि इन सभी में कुछ न कुछ अलग है, कोई भी एक जैसा नहीं है। कुछ में लगभग पूरी तरह से जानवरों के चित्र हैं, कुछ में ज्यामितीय डिज़ाइन हैं, लेकिन इनमें से किसी भी स्थल के बीच कोई ख़ास संबंध नहीं है।

क्या उन्हें अलग-अलग समय पर अलग-अलग समूहों के लोगों ने अंजाम दिया था? क्या हम किसी निश्चित समयावधि में एक क्षेत्र से दूसरे क्षेत्र में व्यक्तियों के एक समूह के प्रवास के प्रमाण देख रहे हैं? मुझे यकीन है कि उस व्यापक तस्वीर को समझने के लिए और भी बहुत कुछ विश्लेषण किया गया है और किया जाएगा, और सच तो यह है कि आज हम उस समग्र तस्वीर का शायद केवल एक छोटा सा हिस्सा ही देख पा रहे हैं।





उक्शी का दूसरा पक्ष इस बात का अच्छा उदाहरण है कि ये शैलचित्र स्थल कितने भिन्न हो सकते हैं।

साइट 2
यदि आपने अक्टूबर 2018 में कोंकण पेट्रोग्लिफ्स को प्राप्त मीडिया कवरेज के बारे में पढ़ा है, तो आप इस स्थल पर की गई नक्काशी से परिचित होंगे।


यहाँ केवल एक ही पशु दर्शाया गया है, एक नर भारतीय हाथी की विशाल आदमकद नक्काशी। जैसा कि हमने अन्य स्थलों पर देखा है जहाँ पशुओं को दर्शाया गया है, हालाँकि केवल एक अगला और एक पिछला पैर ही उकेरा गया है, दोनों कान मौजूद हैं। इस हाथी के मामले में हम दोनों दाँत भी देख सकते हैं, और यह भी स्पष्ट रूप से दर्शाया गया है कि यह पशु किस लिंग का है!

लैटेराइट में दरारों की रेखाओं के कारण हाथी का अगला पैर पहचानना थोड़ा मुश्किल हो जाता है, एक बार तो मुझे लगा कि उन्होंने आकृति बनाने के लिए इन्हीं दरारों में से किसी एक का दोबारा इस्तेमाल किया है। लेकिन ऐसा नहीं है, और इस नक्काशी को और भी ख़ास बनाने के लिए मैंने तस्वीर में दरारों की रेखाएँ हटाकर और परिप्रेक्ष्य को थोड़ा बदलकर इसे थोड़ा संशोधित किया है। यह कुछ इस तरह दिखता है:

उक्षी में हाथी के चित्र की कंप्यूटर द्वारा उन्नत छवि
उक्षी में हाथी के चित्र की कंप्यूटर द्वारा उन्नत छवि
यह एक अद्भुत नक्काशी है, जिस तरह से उन्होंने जमीन पर इतने बड़े पैमाने पर सही अनुपात हासिल करने में कामयाबी हासिल की, वह आश्चर्यजनक है।

सप्ताहांत में हमने जिन अन्य स्थलों का दौरा किया, उनमें से लगभग सभी के विपरीत, यहाँ परिदृश्य में नक्काशी के अस्तित्व को पहचानने का कुछ प्रयास किया गया है। हाथी की नक्काशी के चारों ओर एक नीची लैटेराइट ईंट और गारे की दीवार बनाई गई है, जिसके एक छोर पर एक सीढ़ीदार दृश्य मंच है और एक सूचना बोर्ड (जब हम गए थे तब यह खाली था) की व्यवस्था है।

यह सब स्थानीय ग्रामीणों द्वारा वित्तपोषित और कार्यान्वित किया गया, जिन्होंने इस शैलचित्र की क्षमता को पहचाना और न केवल आगंतुकों को प्रोत्साहित किया (अपनी अर्थव्यवस्था को बढ़ावा दिया), बल्कि यह भी सुनिश्चित किया कि इसकी सुरक्षा और सम्मान हो। ये सभी इरादे नेक हैं, और उन्हें इस बात के लिए श्रेय दिया जाना चाहिए कि उन्होंने कुछ करने की इच्छा जताई और वास्तव में आर्थिक और जनशक्ति दोनों से प्रयास किया।

हालाँकि, मुझे लगता है कि सही सलाह-मशविरा से चीज़ें थोड़ी बेहतर हो सकती थीं। ईंट की दीवार और देखने का मंच हाथी की शैलचित्र के बेहद करीब हैं। मेरे लिए, इसने मेरे देखने के अनुभव को ही खराब कर दिया, क्योंकि हाथी को साँस लेने की भी जगह नहीं मिलती। मुझे नहीं पता कि नक्काशी के आसपास लेटराइट के विशेषज्ञों ने पहले कितना आधिकारिक विश्लेषण किया होगा ताकि यह सुनिश्चित किया जा सके कि दीवार किसी और शैलचित्र के ऊपर तो नहीं बनी है, चाहे वह कितना भी सूक्ष्म या महत्वहीन क्यों न लगे।

इसके अलावा, यह दीवार सामान्य रोज़मर्रा के कंक्रीट से बनी है, चूने के गारे से नहीं। इसका मतलब है कि दीवार के नीचे का लैटेराइट लगभग पूरी तरह से क्षतिग्रस्त हो चुका है, और अब हम इस जगह को कभी भी उसकी प्राकृतिक अवस्था में नहीं लौटा पाएँगे।

इसलिए यहाँ जो कुछ किया गया है, उसके बारे में मेरी मिली-जुली भावनाएँ हैं। निश्चित रूप से यह हाथी की नक्काशी अब आकस्मिक क्षति से सुरक्षित है, और इसकी उपस्थिति निश्चित रूप से इस ओर ध्यान आकर्षित करती है कि यहाँ क्या है और यह कितना महत्वपूर्ण है। लेकिन इसके विपरीत, इन प्रयासों से नक्काशी के आसपास के क्षेत्र को भी नुकसान पहुँचा है, जो मुझे लगता है कि अगर कोई वैकल्पिक उपाय किया गया होता तो इससे बचा जा सकता था।

मुझे यकीन है कि मदद करने वाले संगठनों, स्थानीय लोगों की मदद पाने की इच्छा और उससे जुड़ी वित्तीय व्यवस्था के लिहाज से स्थिति जटिल है। ज़्यादातर ज़मीन मालिकों को अपनी ज़मीन पर हुई खोजों पर बेहद गर्व है, और वे सीमित धन और सर्वोत्तम प्रथाओं के बारे में सीमित ज्ञान के साथ ही अपना सर्वश्रेष्ठ करने की कोशिश कर रहे हैं।

मुझे सचमुच उम्मीद है कि इस स्थिति का कोई व्यावहारिक समाधान निकलेगा। राज्य पुरातत्व विभाग और स्थानीय ग्रामीणों, दोनों को मिलकर काम करना होगा और आने वाली पीढ़ियों के लिए इन स्थलों के संरक्षण को सुनिश्चित करने के साझा लक्ष्य पर काम करना होगा।

हाथी के सिर का विवरण - उक्षी पेट्रोग्लिफ़्स
हाथी के सिर का विवरण - उक्षी पेट्रोग्लिफ़्स
यह उन सात शैलचित्र स्थलों में से एक था, जिन्हें मैंने सप्ताहांत में कोंकण में देखा था। अन्य स्थलों के कुछ त्वरित लिंक यहां दिए गए हैं:

कोंकण शैलचित्रों का परिचय
बार्सू सदा
देवाचे गोथाने
रुंधे ताली
चावे डेवुड
उक्षी
निवाली
काशेली
अगर आपको यह ब्लॉग पोस्ट पसंद आया हो, तो कृपया इसे 'लाइक' करें या अपनी टिप्पणी जोड़ें। अगर आप किसी भी नई सामग्री की सूचना पाना चाहते हैं, तो बस 'फ़ॉलो' बटन पर क्लिक करके साइन अप करें। अगर आपको यह या मेरी कोई और पोस्ट पसंद आई हो, तो कृपया मेरे लिए एक कॉफ़ी ज़रूर खरीदें। डेस्कटॉप उपयोगकर्ताओं के लिए इस वेबसाइट के दाईं ओर और मोबाइल उपयोगकर्ताओं के लिए टिप्पणी अनुभाग के ठीक ऊपर ऐसा करने की सुविधा उपलब्ध है। धन्यवाद!

अगर आप मेरी किसी भी फ़ोटोग्राफ़ी या लेख का इस्तेमाल करने में रुचि रखते हैं, तो कृपया मुझसे संपर्क करें। मैं दुनिया भर में किसी भी फ्रीलांस काम के लिए भी उपलब्ध हूँ, मेरा डफ़ल बैग हमेशा तैयार रहता है...

KevinStandage1@gmail.com
kevinstandagephotography.wordpress.com



zeenews.india.com
रत्नागिरीत बारसू सड्यावरील कातळशिल्प पुन्हा चर्चेत; संशोधक आणि अभ्यासकांनी केली पाहणी
~3 minutes
Ratnagiri Barsu Refinery : रत्नागिरीत बारसू सड्यावरील कातळशिल्प पुन्हा एकदा चर्चेत आली आहेत. रत्नागिरीत बारसू सड्यावरील कातळशिल्पांची देशभरातील संशोधक आणि अभ्यासकांनी पाहणी केली. यावेळी  खासदार विनायक राऊतही उपस्थित होते.  कातळशिल्प ही देशासाठी आणि जगासाठी देणगी असून बारसूच्या सड्याचं संवर्धन होण्याची गरज असल्याचं राऊतांनी म्हटल आहे. 

कातळशिल्पांचा जागतिक वारसा यादीत समावेश व्हावा अशी उद्धव ठाकरे यांची मागणी
बारसू दौ-यादरम्यान उद्धव ठाकरेंनी बारसू येथील सड्यावरील कातळशिल्पांची पाहणी केली. या अमूल्य ठेव्याचं जतन व्हायला हवं असं ते म्हणाले.. तसंच या कातळशिल्पांचा जागतिक वारसा यादीत समावेश व्हावा अशी मागणी केल्याचं त्यांनी यावेळी सांगीतलं. 

युनेस्कोच्या जागतिक वारसास्थळांसाठी  महाराष्ट्रातील 12 किल्ले आणि 10 कातळशिल्पांची निवड 
युनेस्कोच्या जागतिक वारसास्थळांसाठी पाठविण्यात येणाऱ्या प्रस्तावासाठी राज्यातील 12 किल्ले आणि 10 कातळशिल्पांची निवड भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षण विभागाने केली. किल्ल्यांमध्ये शिवनेरी, तोरणा, साल्हेर, मुल्हेर, प्रतापगड, गाळणा,  राजगड, रायगड, सिंधुदुर्ग, पद्मादुर्ग, विजयदुर्ग, कुलाबा किल्ल्यांचा समावेश आहे. तर रत्नागिरी, लांजा आणि राजापूर या तीन तालुक्यांतील 57 गावांमध्ये सड्यावर 1200 कातळशिल्पे कोरलेली आहेत, त्यांचा ही प्रस्ताव पाठवण्यात आला आहे. 

गुप्तधनासाठी भुईकोट किल्ला नामशेष होण्याच्या मार्गावर 
बुलढाण्यात राष्ट्रमाता जिजाऊंचे वडील लखुजीराव जाधव यांचा आडगावराजा इथला भुईकोट किल्ला नामशेष होण्याच्या मार्गावर आहे. आडगावराजातील या ऐतिहासिक भुईकोट किल्ल्यात मोठ्या प्रमाणात गुप्तधनासाठी खोदकाम केलं जात आहे. यामुळे संबंधितांनी याची गांभीर्यानं दखल घेऊन कारवाई करण्याची मागणी होत आहे. 

महादेवाच्या पिंडीखाली कासवाची सोन्याची मूर्ती
बीडमध्ये भगवान पुरुषोत्तमाच्या मंदिरातील महादेवाच्या पिंडीखाली कासवाची सोन्याची मूर्ती सापडलीय. गोदावरी नदीच्या काठावर राजा रामदेवराय यांनी हे उभारले असून, या मंदिराचं बांधकाम सुरू आहे. खोदकाम करून पिंडी बाजूला काढण्यात आलीय. त्या पिंडीखाली कासवाची सोन्याची मूर्ती आढळून आलीय. ही मूर्ती जवळपास एक तोळ्याची आहे. मूर्ती मिळाल्याची माहिती मिळताच भाविकांनी गर्दी करत या सोन्याच्या मूर्तीची पूजा केली. नवीन मंदिराची निर्मिती केल्यानंतर पुन्हा ही मूर्ती पिंडीखाली ठेवण्यात येणार आहे.

घराच्या बांधकामासाठी खोदकामावेळी सापडल्या तोफा आणि ऐतिहासिक साहित्य
नंदुरबार जिल्ह्यातील पडळदा गावात पुरातन काळातल्या तोफा सापडल्यात. एका घराच्या बांधकामासाठी खोदकाम केलं जात होतं. या खोदकामावेळी 10 तोफा आणि इतर ऐतिहासिक साहित्य सापडले. या तोफा जवळपास साडेतीनशे वर्ष जुन्या असल्याचा अंदाज आहे. चार ते पाच फूट लांबीच्या या तोफा पंचधातूच्या असून त्यात एक तोफ पितळीची आहे. या तोफांचे वजन जवळपास सह क्विंटल आहे. प्रशासनानं या तोफांचा पंचनामा केला असून, या तोफा गावातच ठेवण्याचा आग्रह गावकऱ्यांनी धरलाय. 

lokmat.com
सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या पुरातत्व वैभवात भर, खोटले धनगरवाडी सड्यावर ३५ हून अधिक कातळशिल्पे
ऑनलाइन लोकमत
4–5 minutes
सिंधुदुर्गनगरी : सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या पुरातत्व वैभवात भर घालणारी आणखी ३५ हून अधिक कातळशिल्पे उजेडात आली आहेत. कसालपासुन अवघ्या दहा किलोमीटरवरील खोटले (ता. मालवण) गावच्या धनगरवाडी सड्यावर आढळलेल्या या शिल्पांमध्ये मनुष्याकृती, प्राणी, मासे, अमूर्त रचना यांचा समावेश आहे. विशेष म्हणजे येथे आढळलेले 'लज्जागौरी'सदृश कातळशिल्प आश्चर्यकारक असून आधुनिक काळातील लज्जागौरी हे या प्रतिमेचे उन्नत रुप असावे, अशी शक्यता आहे.

मात्र या सर्व कातळशिल्पांचे अस्तित्व या परिसरातील चिरेखाणींमुळे धोक्यात आल्याचे धक्कादायक चित्र समोर आले असून अनेक कातळशिल्पे चिरेखाणींमध्ये नष्टही झाल्याचे समोर आले आहे, अशी माहिती या कातळशिल्पांचा शोध लावणारे अभ्यासक व 'घुंगुरकाठी, सिंधुदुर्ग' संस्थेचे अध्यक्ष सतीश लळीत यांनी दिली.

आपल्या या नव्या शोधाबाबत माहिती देताना श्री. लळीत म्हणाले की, मी गेली २१ वर्षे जिल्ह्यातील कातळशिल्पांचे संशोधन व अभ्यास करीत आहे. अलिकडेच माझे 'सिंधुदुर्गातील कातळशिल्पे' हे पुस्तकही प्रकाशित झाले आहे. नवीन कातळशिल्पे शोधण्याचे प्रयत्न सातत्याने सुरु असताना खोटले येथील माळरानावर 'वेताळा'चे चित्र कोरलेले आहे, अशी माहिती मिळाल्यावर मी व डॉ. सौ. सई लळीत अशा दोघांनी या परिसरात मोहिम आखली.

या परिसरात राहणारे लक्ष्मण बाबु जंगले यांच्या मदतीने शोध घेतला असता खोटले आणि पोईपच्या सीमेवर एका टेकडीच्या उतारावरील झाडाझुडपांमध्ये जांभ्या दगडात कोरलेली मानवाकृती निदर्शनास आली. वास्तविक हे एक कातळशिल्प असुन येथील लोकमानस त्याला 'वेताळ' म्हणुन ओळखते. यासंदर्भात काही लोककथाही या भागात प्रचलित आहेत. या 'वेताळा'ला नवसही बोलले जातात, अशी माहिती मिळाली.

या कातळशिल्पांमध्ये सहा मनुष्याकृती, तीन चतुष्पाद प्राणी, दोन मासे, गोलाकृती व अन्य १२ अमूर्त शिल्पे, एक शिल्पपट्ट किंवा मांड याचा समावेश आहे. यापैकी काही कातळशिल्पे झिजलेली असून काही अतिशय सुस्थितीमध्ये आहेत. अगदी सुरुवातीलाच २० फुट व्यासाचे एक वर्तुळाकृती कातळशिल्प नजरेला पडते. येथून अवघ्या काही फुटांवर एक मोठी चिरेखाण आहे. या ठिकाणाहून सुमारे अर्धा किलोमीटर पुढे गेल्यावर टेकडीच्या उतारावर झाडाझुडपांमध्ये एक सुस्पष्ट मानवाकृती दिसते. तिच्या शिराकडच्या बाजुला दगडांचा मोठा ढिग आहे. स्थानिक रहिवासी याला 'वेताळ' म्हणुन ओळखतात.

अशीच मानवाकृती हिवाळे, कुडोपी येथेही आढळली आहे. याचठिकाणी एक गुहासुद्धा आढळली. मात्र आता ती मातीने भरली आहे. येथून आणखी सुमारे एक किलोमीटर परिसरात एका छोट्याशा टेकडीवर एकाच ठिकाणी विविध प्रकारची ३० कातळशिल्पे आढळून येतात. आमच्यासोबत असणाऱ्या स्थानिकांनीही ती प्रथमच पाहिली. या सर्व कातळशिल्पांमधील माती, गवत काढल्यानंतर ती स्पष्ट दिसु लागली. याठिकाणी वाघासारख्या प्राण्याची दोन चित्रे अतिशय महत्वपूर्ण आहेत, अशी माहिती लळीत यांनी दिली.

0

Powered by:PS


घटना महाराष्ट्रासाठी भूषणावह

सिंधुदुर्ग व रत्नागिरी जिल्ह्यात जांभ्या दगडाच्या सडेपठारांवर आढळणारी ही कातळशिल्पे म्हणजे आदिमानवाच्या या परिसरातील वास्तव्याच्या पाऊलखुणा आहेत. या कातळशिल्पांची निर्मिती मध्याश्मयुग ते नवाश्मयुग (इसवीसनपूर्व २० ते १० हजार वर्षे) या काळात झाली असावी. अलिकडेच राज्य शासनाच्या पुरातत्व व वस्तुसंग्रहालयाने केंद्र सरकारमार्फत कातळशिल्पांना 'जागतिक वारसा स्थळ' म्हणुन मान्यता मिळावी असा प्रस्ताव 'युनेस्को' या जागतिक संस्थेकडे पाठवला होता. तो प्राथमिक स्वरुपात स्वीकारुन त्यांचा समावेश तात्पुरत्या यादीत करण्यात आला आहे. यामघ्ये सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुडोपी येथील कातळशिल्पांचा समावेश आहे. ही घटना केवळ जिल्ह्याच्याच नव्हे तर महाराष्ट्राच्यादृष्टीनेही भुषणावह आहे, असे लळीत यांनी सांगितले.

आमच्या न्यूजलेटरसाठी साईन-अप करा

'लज्जागौरी'सदृश शिल्प आश्चर्यकारक  

खोटले येथे आढळलेल्या एका कातळशिल्पाचे 'लज्जागौरी' किंवा मातृदेवतेच्या मुर्तीशी विलक्षण साम्य आहे. हे शिल्प आश्चर्यकारक आहे. लज्जागौरी ही सुफलनाचे आणि समृद्धीचे प्रतीक मानली जाते. जगभरात एक काळ मातृसत्ताक पद्धतीचा होता, असे मानले जाते. त्याकाळी ही संकल्पना रुजली असावी, असे एक मत आहे. शिवाय, स्त्रीच्या ठिकाणी असलेल्या उत्पतीच्या शक्तीमुळे सन्मानाचे स्थान दिले असावे.



royalbhatka.com
निवळी गावातील बारव आणि कातळशिल्प
Royal bhatka
6–7 minutes
निवळी गावातील बारव आणि कातळशिल्प



भारतात ब्रिटीश राजवट येऊन स्थिरावण्यापूर्वी शतकानुशतके आपल्या ज्ञानातून आणि परंपरेतून भारतीय समाज जलविज्ञानाचा वापर  दैनंदिन गरजांसाठी करीत होते. त्याचा एक उत्तम नमुना म्हणजे रत्नागिरी जिल्ह्यातील निवळी फाट्याजवळ रस्त्यालगतच जांभ्या कातळात खोदलेली ही बारव ! प्राचीन काळापासूनच सिंचन आणि पिण्यासाठी, पाण्याचा साठा वर्षभर रहावा यासाठी काटेकोर व्यवस्थापन धोरणांची अंमलबजावणी अशा विहिरींच्या माध्यमातून केलेली दिसते. जांभ्या खडकात खोलवर खोदलेल्या विहिरी भर उन्हाळ्यात सुद्धा थंड पाण्याचा आनंद देतात. साधारणतः ४० ते ५० पायऱ्यांची ही नंदा बारव (एकाच बाजूने विहिरीत उतरण्याचा मार्ग असलेली) प्रकारातील बारव आहे. कोकणात अशा प्रकारच्या विहिरींना घोडबाव सुद्धा म्हटले जाते. विहिरीच्या बाहेरील बाजूस दोन फूट लांब आणि दीड फूट रुंद दगडी भांडे पाहायला मिळते.  




जयगड आणि रत्नागिरी यांसारख्या प्राचीन बंदरांमधून जाणाऱ्या मार्गावर वाटसरू आणि व्यापारी या दोन्हीसाठी ही विहीर म्हणजे एक वरदान असणार यात काही शंकाच नाही. पावसाळयात तुडुंब भरलेली निळ्याशार पाण्याची विहीर बघताच क्षणी मनाला भुरळ पाडते. निवळी फाट्यापासून ७५० मीटर अंतरावर असलेली विहीर आजूबाजूला नव्याने बांधलेल्या हॉटेल आणि रिसॉर्टमधूनही  आपलं अस्तित्व टिकवून आहे. 



विहिरीच्या समोरच रस्त्यापालिकडे एक १५ फूट × १५ फूट आकाराचे कातळचित्र / कातळशिल्प कोरलेले आहे. ह्याच ठिकाणामुळे सर्वप्रथम कातळचित्र ही गोष्ट लोकांसमोर आली. १९८० च्या दरम्यान नवीन रस्त्याचे काम चालू असताना कातळात खोदलेला चित्रांचा एक संच लोकांच्या नजरेस पडला. कोकणात सापडलेली ही कातळचित्रांची पहिली जागा. त्याचा बराचसा भाग हा आज रस्त्याखाली गाडला गेला आहे. उर्वरित भागांतील चित्रांमध्ये भौमितिक आकार, उभ्या-आडव्या रेघा आणि अनेक वक्राकार रेषा बघायला मिळतील. 'कोकणातील पर्यटन' या पुस्तकात प्र. के.घाणेकर यांनी निवळी गावातील कातळशिल्प या विषयावर प्रकाश टाकला. श्री.रवींद्र लाड यांचे 'कोकणातील कातळशिल्पे आणि सिंधू संस्कृती' आणि श्री. सतीश लळीत यांचे 'सिंधुदुर्गातील कातळशिल्पे' ही कातळशिल्पांवर पुस्तके प्रकाशित झाली आहेत. उभ्या भिंतीवर कोरलेल्या चित्रांना Petroglyps म्हणतात. 'पेट्रा' म्हणजे दगड आणि 'ग्लिफिन' म्हणजे कोरीवकाम. आडव्या भिंतीवर / दगडावर कोरलेल्या आकृत्यांना किंवा चित्रांना  geoglyps संबोधले गेले. ह्या चित्रांची काळनिश्चिती जरी झाली नसली तरी, ह्या आकृत्या कोणी व का कोरल्या असतील हे अजूनही एक गूढच आहे. जगात इतरत्र आढळणाऱ्या कातळचित्रांपेक्षा कोकणातील कातळचित्रे खूपच वेगळी आहेत. रत्नागिरीच्या निसर्गयात्री संस्थेने कोकणात एकूण ४० पेक्षा जास्त गावांतून १५०० पेक्षा जास्त चित्रे उजेडात आणली. युनेस्कोच्या यादीत कोकणातील कशेळी, रुंध्येतळी, देवाचे गोठणे, बारसू, देवी हसोळ, जांभरूण, कुडोपी, उक्षी आणि गोव्यातील पानसायमोल अश्या ९ ठिकाणची चित्रे समाविष्ट झाली आहेत. त्यामुळे जगभरातल्या अभ्यासकांची पावलं नक्कीच इकडे वळतील. ह्या चित्रांच्या माध्यमातून व्यक्त होणारा मानव हा फारच कलात्मक आणि कल्पक बुद्धीचा असणार हे मात्र नक्की!!! 






https://www.royalbhatka.com/2023/02/blog-post.html











 




lokmat.news18.com
कोकणाला जगाच्या पटलावर आणणारी कातळशिल्प आहे तरी काय?
Rahul Punde, News18 Lokmat
6–8 minutes
महाराष्ट्र विधानसभा निवडणूक
मुंबई
पुणे
कोल्हापूर
Nagpur
नाशिक
विदेश
Career
क्राइम
#MakeADent
कोकणाला जगाच्या पटलावर आणणारी कातळशिल्प आहे तरी काय?
कोकणामध्ये प्राचीन आणि मध्ययुगीन ऐतिहासिक वास्तूंचा वारसा आजही अस्तित्वात आहे.
01

मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी खेडमधील सभेत काळतशिल्पांचा उल्लेख केला. कोकणातील बारसूमध्ये युनेस्कोला कातळशिल्प सापडली असून त्यामुळे रिफायनरी होणार नसल्याचं ठाकरे म्हणारे. या निमित्ताने पुन्हा एकदा कातळशिल्प चर्चेत आली आहेत. मात्र, काळतशिल्प म्हणजे काय? त्यांचं इतिहासात किती महत्त्व आहे? हे अनेकांना माहिती नाही.
मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी खेडमधील सभेत काळतशिल्पांचा उल्लेख केला. कोकणातील बारसूमध्ये युनेस्कोला कातळशिल्प सापडली असून त्यामुळे रिफायनरी होणार नसल्याचं ठाकरे म्हणारे. या निमित्ताने पुन्हा एकदा कातळशिल्प चर्चेत आली आहेत. मात्र, काळतशिल्प म्हणजे काय? त्यांचं इतिहासात किती महत्त्व आहे? हे अनेकांना माहिती नाही.

02

राज ठाकरे म्हणाले, युनेस्को जगभरातील अनेक हेरिटेज वास्तूंच जतन करते. आता आपल्याकडे कातळशिल्प सापडली आहेत. त्यामुळे अशा हेरिटेज वास्तूच्या आसपास कोणताही मोठा प्रकल्प किंवा युनेस्कोच्या परवानगीशिवाय मोठं बांधकाम करता येत नाही. कातळशिल्पांच्या आसपास 3 किलोमीटरपर्यंत कुठलाही विकास प्रकल्प करता येणार नाही. बारसूच्या रिफायनरी साईटच्या परिसरांत कातळशिल्प आहेत, म्हणजे इथे रिफायनरी होऊच शकत नाही.
राज ठाकरे म्हणाले, युनेस्को जगभरातील अनेक हेरिटेज वास्तूंच जतन करते. आता आपल्याकडे कातळशिल्प सापडली आहेत. त्यामुळे अशा हेरिटेज वास्तूच्या आसपास कोणताही मोठा प्रकल्प किंवा युनेस्कोच्या परवानगीशिवाय मोठं बांधकाम करता येत नाही. कातळशिल्पांच्या आसपास 3 किलोमीटरपर्यंत कुठलाही विकास प्रकल्प करता येणार नाही. बारसूच्या रिफायनरी साईटच्या परिसरांत कातळशिल्प आहेत, म्हणजे इथे रिफायनरी होऊच शकत नाही.


विसाव्या शतकाच्या शेवटच्या दशकात (1990) कोकणातील रत्नागिरी जिल्ह्यात निवळी येथे रस्त्याच्या रुंदीकरणाचे काम सुरू असताना जांभ्या दगडाच्या सड्यावर/कातळावर 'कातळशिल्प' नावाची कोरलेली चित्रे दिसून आली आणि कोकणातील इतिहासाला नवी कलाटणी मिळाली. ही चित्रे म्हणजेच अश्मयुगीन मानवी वावराच्या पाऊलखुणाच आहेत.
विसाव्या शतकाच्या शेवटच्या दशकात (1990) कोकणातील रत्नागिरी जिल्ह्यात निवळी येथे रस्त्याच्या रुंदीकरणाचे काम सुरू असताना जांभ्या दगडाच्या सड्यावर/कातळावर 'कातळशिल्प' नावाची कोरलेली चित्रे दिसून आली आणि कोकणातील इतिहासाला नवी कलाटणी मिळाली. ही चित्रे म्हणजेच अश्मयुगीन मानवी वावराच्या पाऊलखुणाच आहेत.

कातळशिल्प म्हणजे नक्की काय? तर याला इंग्रजीमध्ये 'पेट्रोग्लिफ्स' असे म्हणतात. हा मूळ ग्रीक भाषेतील शब्द. 'पेट्रा' म्हणजे दगड आणि 'ग्लिफिन' म्हणजे कोरीव काम. म्हणून याला 'पेट्रोग्लिफ्स' अशी संज्ञा प्राप्त झाली.

अश्मयुगातील मानवाने तयार केलेली गुहाचित्रे (शैलचित्रे), प्रस्तरचित्रे ही उभ्या दगडांवर/भिंतींवर असतात. तर आडव्या भूपृष्ठावर असणाऱ्या चित्रांना/आकृत्यांना 'जिओगलिप्स' असे संबोधतात. काही रेषांची चित्रे असतात त्यांना 'अर्थ लाइन्स' (पेरू देशातील नाझ्का लाइन्स) असे म्हणतात.
या प्रकारची चित्रे जगभरात आढळली आहेत. परंतु, कोकणातील कातळशिल्पे आपले वेगळे अस्तित्व दाखवतात. अश्मयुगातील किंवा प्रागैतिहासिक काळातील मानवाने या आकृत्या नक्की कोणत्या कालखंडात कोरल्या असाव्या त्याची निश्चिती अद्यापही झालेली नाही.

07

तसेच या आकृत्या कोरण्यामागे काय कारण होते, त्या कशासाठी कोरल्या, कशा पद्धतीने कोरल्या, इत्यादी अनेक प्रश्न आजच्या तारखेला अज्ञात आहेत.
तसेच या आकृत्या कोरण्यामागे काय कारण होते, त्या कशासाठी कोरल्या, कशा पद्धतीने कोरल्या, इत्यादी अनेक प्रश्न आजच्या तारखेला अज्ञात आहेत.

08

कोकणातील कातळशिल्पांमध्ये प्राणी, पक्षी, मासे, इत्यादी आकृत्या प्रामुख्याने चित्रित केल्या आहेत. त्यामुळे शिकारी आणि मासेमारी करून उपजीविका करण्याच्या काळातील ही कला असावी, असा कयास करता येतो.
कोकणातील कातळशिल्पांमध्ये प्राणी, पक्षी, मासे, इत्यादी आकृत्या प्रामुख्याने चित्रित केल्या आहेत. त्यामुळे शिकारी आणि मासेमारी करून उपजीविका करण्याच्या काळातील ही कला असावी, असा कयास करता येतो.

09

कोकणातील ही कातळशिल्पे अरबी समुद्र आणि लगतचा सह्याद्री या भूभागातील रत्नागिरी ते सिंधुदुर्ग परिसरातील जवळपास 170 किमी लांब आणि 25 किमी रुंद पट्ट्यात आढळली आहेत. पुढे गोवा आणि कर्नाटकामध्येही कातळशिल्पे आहेत.
कोकणातील ही कातळशिल्पे अरबी समुद्र आणि लगतचा सह्याद्री या भूभागातील रत्नागिरी ते सिंधुदुर्ग परिसरातील जवळपास 170 किमी लांब आणि 25 किमी रुंद पट्ट्यात आढळली आहेत. पुढे गोवा आणि कर्नाटकामध्येही कातळशिल्पे आहेत.

FIRST PUBLISHED : May 6, 2023, 10:55 PM IST
मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी खेडमधील सभेत काळतशिल्पांचा उल्लेख केला. कोकणातील बारसूमध्ये युनेस्कोला कातळशिल्प सापडली असून त्यामुळे रिफायनरी होणार नसल्याचं ठाकरे म्हणारे. या निमित्ताने पुन्हा एकदा कातळशिल्प चर्चेत आली आहेत. मात्र, काळतशिल्प म्हणजे काय? त्यांचं इतिहासात किती महत्त्व आहे? हे अनेकांना माहिती नाही.
कोकणाला जगाच्या पटलावर आणणारी कातळशिल्प आहे तरी काय?
मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी खेडमधील सभेत काळतशिल्पांचा उल्लेख केला. कोकणातील बारसूमध्ये युनेस्कोला कातळशिल्प सापडली असून त्यामुळे रिफायनरी होणार नसल्याचं ठाकरे म्हणारे. या निमित्ताने पुन्हा एकदा कातळशिल्प चर्चेत आली आहेत. मात्र, काळतशिल्प म्हणजे काय? त्यांचं इतिहासात किती महत्त्व आहे? हे अनेकांना माहिती नाही.


bbc.com
कोकणात कातळशिल्पं कोरणारा माणूस कुठे राहायचा? पाहा फोटो - BBC News मराठी
6–7 minutes
कोकणात कातळशिल्पं कोरणारा माणूस कुठे राहायचा? पाहा फोटो
कातळशिल्प

फोटो स्रोत, SHARAD BADHE

10 जून 2022

कोकणातल्या कातळावर दिसणारी ही शिल्पं कोणी कोरली असावीत याचं गूढ अद्याप उलगडलेलं नाही. पण गेल्या काही वर्षांमध्ये ही अशी शिल्पं कोकणात हजारोंच्या संख्येने सापडत आहेत.

कातळशिल्प

फोटो स्रोत, SHARAD BADHE

कोकणतल्या रत्नागिरी-राजापूर पट्ट्यात अचानक जमिनीतून वर यावीत तशी ही कातळशिल्पं गेल्या काही वर्षांत समोर आली आहेत. याअगोदर त्यांच्याकडे कोणा पुरातत्वशास्त्रज्ञाचं लक्ष का गेलं नाही हे एक कोडंच आहे. पण काही स्थानिक देवदेवतांचं स्वरूप घेऊन, तर बहुतांश सड्यांवरच्या मातीखाली दबली गेली होती.

मुळात ही कातळशिल्पं आहेत तरी काय? कोकणातल्या सड्यांवर, म्हणजे खडकाळ भूभागांवर, कोरलेली ही चित्रं आहेत. ती अनेक प्रकारची आहेत. त्यात प्राणी आहेत, पक्षी आहेत, मानवी आकृत्या आहेत, भौमितिक रचना आहेत, नुसतेच आकार आहेत. या चित्रांवरून लगेचच समजतं की अप्रगत मानवानं अगदी प्राथमिक टप्प्यात कोरलेली ही चित्रं आहेत. मानवी संस्कृतीच्या विकासाच्या प्रवासात अशा प्रकारची कोरलेली चित्रं जगाच्या अनेक प्रदेशांत सापडतात. काही अभ्यासक त्यांना 'खोदशिल्पं' असंही म्हणतात, तर इंग्रजीमध्ये त्यांना 'पेट्रोग्लिफ्स' असं म्हणतात.

2018 मध्ये 'बीबीसी मराठी'ची टीम पहिल्यांदा तिथं गेली होती. पण आता गेल्या चार वर्षांत नवं संशोधन, उत्खनन झालं आहे. काही उत्तरं मिळाली आहेत. आता पर्यंत या अज्ञात चित्रकाराबद्दल काय समजलं आहे, हे जाणून घेण्यासाठी सड्यांना पुन्हा एकदा भेट देण्यात आली.

कातळशिल्प

फोटो स्रोत, Sharad Badhe/BBC

महाराष्ट्र पुरातत्व संचालनालयाचे संचालक डॉ. तेजस गर्गे याबाबत सांगतात, आपण सुरुवातीला जो कालखंड कल्पना केला होता, त्यापेक्षा तो मोठा आहे. ऐतिहासिक काळातही हे कातळशिल्प निर्मिर्तीचं काम सुरु राहिलेलं आहे. ज्यावेळेस उत्तर कोकणात कान्हेरीसारखी लेणी खोदली जात होती, त्याच वेळेला दक्षिण कोकणात कातळशिल्पं पण खोदली गेली आहेत. म्हणजे थोडक्यात हा कालखंड 20 हजार वर्षं ते ख्रिस्तपूर्व दुसरं शतक इतका मोठा आहे

कोकणातल्या सड्यांवरच्या या कातळशिल्पांमध्ये प्राण्यांसोबत अनेक अगम्य आकार किंवा भौमितिक रचनाही पहायला मिळतात. यातल्या काही चित्रांचे आकारही अवाढव्य आहेत. काही चित्रं तर अगदी 50 फुटांहूनही अधिक लांबीची आहेत आणि काहींमध्ये असलेलं भौमितिक प्रमाणही तोंडात बोटं घालायला लावतं. म्हणजे या माणसाला भूमितीची जाण असावी का?

कोकण, इतिहास, भूगोल, संस्कृती, महाराष्ट्र

फोटो स्रोत, Sharad Badhe/BBC

फोटो कॅप्शन, कोकणातली कातळशिल्पं
आश्चर्याची गोष्ट ही की या कातळशिल्पांमध्ये दिसणारे गेंडा, पाणघोडा यांच्यासारखे काही प्राणी हे कोकणात आढळतही नाहीत. मग या माणसानं ते पाहिले तरी कुठे? तो स्थलांतरित होता की त्या काळात हे प्राणी कोकणभागात होते? असे अनेक प्रश्न अभ्यासानंतर सुटणार आहेत.

कातळशिल्प

फोटो स्रोत, SHARAD BADHE

भारतविद्या आणि कलाइतिहास अभ्यासक सायली पलांडे-दातार सांगतात, "जेव्हा आपण पुरातत्वशास्त्राच्या अंगानं बघतो तेव्हा आपल्याकडे उत्खननं केली जातात. त्यात आपण खोल खाली जाऊन सांस्कृतिक क्रम आहे तो शोधतो. इथे सडा आहे सगळीकडे. माती कुठेच नाही की जिच्यात मानवी अस्तित्वाच्या खुणा मिळतील. थोडीफार हत्यारं मिळाली आहेत, पण उत्खननात जे अन्डिस्टर्ब्ड लेयर्स मिळाल्या पाहिजेत, तसं इथे मिळत नाही. किमान शिल्पांच्या आसपास मिळत नाही. म्हणून आपल्याला इतर प्रकारच्या गोष्टी वापरायला लागत आहेत. त्यासाठी मी आर्ट हिस्टॉरिक मेथड्स वापरायचा प्रयत्न करते आहे.

ज्या चित्रपाशी आता आपण उभे आहोत त्याकडे बघतांना आपल्याला वाघासारखे दोन मोठे महाकाय प्राणी दिसतात आणि मधे तुम्हाला एक मानवी आकृती दिसते. त्यात जी सिमेट्री आहे ती त्यांनी विलक्षण साधलेली आहे. हे करणं जिकीरीचं काम आहे. त्यांनी आऊटलाईनवरुन तो एक उठाव दिलेला आहे. एम्बॉस केलेला आहे. आत वेगवेगळे भौमितिक आकार दिसतात. जो मूळचा वाघ आहे त्यामध्ये वेगळेपण आणण्याचाही त्यांनी प्रयत्न केलेला आहे. यात माणसांचं आणि पशूंचा एक संबंध आपल्याला दिसतो आहे"

सायली पलांडे-दातार

फोटो स्रोत, SHARAD BADHE

फोटो कॅप्शन, सायली पलांडे-दातार
कोकणाच्या संपन्न समुद्रकिनाऱ्यावर कायम काहीतरी समृद्ध करणारं मिळालं आहे. अगदी नारळ-पोफळी-आंब्याच्या बागांपासून ते मराठी साहित्य समृद्ध करणा-या साहित्यिकांपर्यंत. आता ही कातळशिल्पं मानवी संस्कृतीच्या आतापर्यंत झालेल्या अभ्यासाला समृद्ध करणार आहेत.

कातळशिल्प

फोटो स्रोत, SHARAD BADHE

कातळशिल्पं तयार करणारा माणूस कुठे राहायचा असा प्रश्न आल्यावर त्याकाळचा मानव गुहेत राहात असावा असा समज असतो. त्यामुळे या परिसरात कुठे गुहा आहेत का याचा शोध सुरू झाला. तो राहाण्याची ठिकाणं शोधली जाऊ लागली. सिंधुदुर्ग जिल्ह्यात केळोशी येथे अशा प्रकारच्या गुहेचा शोध घेण्यात आला. शिल्पं कोरण्यासाठी या मानवानं कातळाची का निवड केली? त्यातून त्याला काय सांगायचं आहे याचा शोध घेणं सुरू आहे.

कातळशिल्प

फोटो स्रोत, SHARAD BADHE

केळोशी येथील या गुहेत आदिम काळातली हजारो हत्यारं सापडली आहेत. त्यासाठी वापरलेले दगड जवळपासच्या नदीपात्रातूनच आणली असावीत असा अंदाज आहे. त्या काळात माणूस याच गुहांमध्ये बसून हत्यारं बनवत असावा असं तज्ज्ञांना वाटतं.

ऋत्विज आपटे

फोटो स्रोत, SHARAD BADHE

फोटो कॅप्शन, ऋत्विज आपटे
पुरातत्व अभ्यासक ऋत्विज आपटे यांनी आम्हाला याबाबत अधिक माहिती दिली.

ते म्हणाले, "दोन ठिकाणी आम्ही ट्रेन्चेस घेतल्या होत्या. त्या ट्रेन्चेसमध्येच आम्हाला खूप सारी दगडी हत्यारं मिळाली. जवळपास हजाराच्या संख्येनं दगडी हत्यारं मिळाली. त्यानंतर हे मटेरियल कुठनं आणलं असेल याचा आम्ही शोध सुरु केला. हे कोकणात मिळणारं मटेरियल नाही किंवा सिंधुदुर्गात मिळणारं मटेरियल नव्हतं. कुठं मिळतं ते? तर जिथे वॉटर बॉडी आहे, नाला आहे, नदी आहे अशा ठिकाणी मिळतात. त्याचा आम्ही शोध घेतला. दोन दोन किलोमीटर नदीपात्रातच मिळाला. तो आम्हाला असा अंदाज आला की हा माणूस तिकडनं दगडं उचलून या गुहेत आणायचा आणि गुहेत बसून तो दगडी हत्यारं बनवत होता. त्यामुळं याला पुष्टी मिळाली की ही हैबिटेशनल साईट होती. इथं माणूस राहिला होता बरीच वर्षं. आणि इथं बसून तो हत्यारं बनवत होता."

कातळशिल्प

फोटो स्रोत, SHARAD BADHE

कोकणातल्या काही कातळशिल्पांजवळ चुंबकीय क्षेत्रातही काही बदल होत असावेत असं जाणवतं. होकायंत्रातली चुंबकीय सुची विचलित होत असल्याचं दिसतं.

कातळशिल्प

फोटो स्रोत, SHARAD BADHE


esakal.com
कोकणात जांभ्या सड्यावर आढळली तब्बल 10 हजार वर्ष जुनी कातळशिल्पं; कुतूहल वाढवणाऱ्या प्रतिमांनी वेधलं लक्ष
सकाळ डिजिटल टीम
2–3 minutes
Updated on: 

09 March 2024, 12:35 pm IST

कोकणात विविध भागात सुमारे 1500 पेक्षा अधिक कातळशिल्प आहेत. पण, तशीच कातळशिल्प दापोली आणि मंडणगडमध्येही आढळली असल्याने त्याबद्दल कुतूहल अधिक वाढलंय.

Katalshilp Found in Dapoli Mandangad : बारसू (ता. राजापूर) आणि चवे (ता. रत्नागिरी) येथील कातळ खोदचित्रांना (Katal Shilp Konkan) राज्य शासनाने काही दिवसांपूर्वी राज्य संरक्षित स्मारक म्हणून घोषित केलं आहे. त्यानंतर आता दक्षिण रत्नागिरीत (South Ratnagiri) राजापूर, लांजा परिसरात सापडलेली कातळशिल्पे दापोली व मंडणगड तालुक्यांतही आढळू लागली आहेत. रत्नागिरीच्या (Ratnagiri) दापोलीमधील उबर्ले गावात काही कातळशिल्प (Katalshilp) आढळली आहेत.

या कातळ शिल्पांवर एलियन सदृश्य प्रतिमा असल्यामुळं अनेकांचं कुतूहलही वाढलंय. अभ्यासकांच्या दाव्यांनुसार, ही कातळशिल्प सुमारे 10 हजार वर्षांपूर्वीची आहेत. अशाप्रकारची कातळशिल्प आसपास अन्यत्र कुठेही नसल्याचं त्यांनी सांगितलंय. 'गाढवाचा खडक' म्हणून ओळखल्या जाणाऱ्या उंबर्ले गावामध्ये ही कातळशिल्प जांभ्या सड्यावर आढळली आहेत.

यामध्ये 6 कातळशिल्पांचा देखील समावेश आहे. मानवासह तीन हरीण आणि 2 बैल देखील आढळली आहेत. सातपैकी एक कातळशिल्प सुमारे 17 फीट लांबीचं आहे. तर, मंडणगडमधील (Mandangad) बोरखत गावामध्येही एक कातळशिल्प आढळलंय. कोकणात यापूर्वी राजापूर, रत्नागिरी, लांजा या पट्ट्यात कातळशिल्प आढळली आहेत.

कोकणात 1500 पेक्षा अधिक कातळशिल्प
कोकणात विविध भागात सुमारे 1500 पेक्षा अधिक कातळशिल्प आहेत. पण, तशीच कातळशिल्प दापोली आणि मंडणगडमध्येही आढळली असल्याने त्याबद्दल कुतूहल अधिक वाढलंय. मीडिया रिपोर्ट्सनुसार, डॉ. अजय धनावडे दापोलीत सापडलेल्या कातळशिल्पांच्या या ठिकाणी भेट देत आहे. सध्या त्यांची मोजमापे, छायाचित्र घेत अभ्यास सुरू केला आहे. कोकणातील कातळशिल्पं ही अश्मयुगीन काळातील असून सुमारे 10 ते 3 हजार वर्षे जुनी असण्याची शक्यता मानली जात आहे.

कोकणच्या सौंदर्याला ‘कातळशिल्पाचे गोंदण’  
  *_- मेहरून नाकाडे रत्नागिरी :  ऐतिहासिक काळातील सांंस्कृतिक संंदर्भ म्हणून कातळशिल्पांंचे विशेष महत्त्व आहे. आदिमानवाने विविध शिल्पे दगडात कोरून ठेवलेली आहेत. मात्र, ती कशाची चित्रे आहेत, त्यातून काय व्यक्त होते हे सांगणे अवघड आहे. मुख्यत्वे लेण्यांच्या भिंतींवर केलेले कोरीव काम सर्वत्र आढळते. परंतु, संपूर्णपणे उघड्यावर असलेल्या कातळावरील ही खोदचित्रे महाराष्ट्रात विशेष करून कोकणातच आढळली आहेत. सर्वाधिक कातळशिल्पे ही रत्नागिरी जिल्ह्यात आहेत. जिल्ह्यातील रत्नागिरी, लांजा, राजापूर तसेच सिंधुदुर्ग जिल्ह्यातील देवगड तालुक्यात शिल्परचना सापडल्या आहेत._*        

*_🖊 विविध प्राणी, पक्षी, सुंदर नक्षीकाम असलेली ही खोदचित्रे गूढ आहेत. जगभरात अशा प्रकारच्या शिल्पकिंवा चित्रांना ‘रॉक आर्ट किंवा पेट्रोग्लिफ्स किंवा कातळशिल्प’ या नावाने ओळखले जाते. रत्नागिरी जिल्ह्यात सापडलेली ही कातळशिल्प नजरेस पडल्यानंतर त्याबाबतचे कुतूहल अधिक वाढले. ही कातळशिल्प पाहण्यासाठी गर्दी होताना दिसत आहे.प्रामुख्याने कातळ सड्यांवर कातळशिल्प शोधमोहीम सुरु आहे. रत्नागिरी, राजापूर, लांजा येथील समुद्रकिनाऱ्यापासून पूर्व दिशेला २५ किलोमीटर अंतरापर्यंत आणि दक्षिणोत्तर सुमारे १५० किलोमीटरच्या अंतरात ३७०० चौरस किलोमीटर परिसरात समाविष्ट गावांमधील कातळ खोदशिल्पाचे संशोधनकार्य सुरु आहे.आपण वाचत आहात माहिती सेवा ग्रूप पेठवडगावची पोस्ट, मानवी संस्कृतीच्या प्रागेतिहास काळातील ही कातळशिल्पे असून, सुधीररिसबूड, प्रा. सुरेंंद्र ठाकुरदेसाई, धनंंजय मराठे यांची हीशोधमोहीम गेली काही वर्षे सुरू आहे. कातळशिल्पांंच्या संंरक्षणासाठी शासना कडून प्रथमच निधी मंंजूर झाला आहे. गावामध्ये खोदशिल्पांचा संदर्भ गोळा करणे, चौकशी करून मित्रमंडळी, ज्येष्ठ गावकºयांकडून खात्री करणे व नंतर ती शोधून काढून त्यांची नोंद करणे, नकाशे तयार करण्याचे काम करण्यात येत आहे.सुंदर कातळशिल्पे संरक्षित करण्यासाठी अधिनियम करुन पुरातत्वविभागाशी चर्चा करण्याचे आश्वासन आयुक्त जगदीश पाटील यांनी आपल्या कोकण भेटीत दिले होते. त्यानुसार पुरातत्व वस्तूसंग्रहालय खात्याचे संचालक तेजस गर्गे यांच्या मार्गदर्शना खाली काम सुरूझाले आहे. ऋत्विज आपटे त्यासाठी कार्यरत असून, कातळशिल्पांना राज्यसंरक्षित दर्जा देण्याचा प्रस्ताव तयार करण्यात आला आहे. लवकरच या शिल्पांना राज्यसंरक्षितदर्जा प्राप्त होणार आहे. कातळशिल्पांबाबतचे आकर्षण पर्यटकांमध्ये वाढले आहे. अनेक पर्यटक खास कातळशिल्प पाहण्यासाठीसहली आयोजित करीत आहेत. भविष्यात ही कातळशिल्पे पर्यटन क्षेत्र म्हणून विकसित होण्याची शक्यता आहे. त्यामुळे जिल्ह्याच्या अर्थकारणावरही चांगला परिणाम होऊन स्थानिकांना रोजगार, व्यवसायाची संधी यामित्ताने उपलब्ध होणार आहे.या कातळशिल्पांमुळे जिल्ह्याच्या पर्यटनाला चालना मिळणार असून, जिल्हा जगाच्या पर्यटन नकाशावर येणार आहे._*
🔹कातळशिल्पांची ठिकाणे रत्नागिरी तालुका - जयगड, चवे, रामरोड, करबुडे, मासेबाव, निवळी, गोळप, निवळी - गावडेवाडी, कापडगाव, उमरे, कुरतडे, कोळंबे, गणेशगुळे, मेर्वी, गावखडी, डोर्ले.
राजापूर तालुका - देवाचेगोठणे, सोगमवाडी, गोवळ, उपळे, साखरेकोंब, विखारे गोठणे, बारसू, पन्हाळे, शेडे, कोतापूर, देवीहसोळ.
लांजा तालुका - भडे, हर्चे, रूण, खानावली, रावारी, लावगण
🔹अश्मयुगीन कातळचित्रे🔹
रत्नागिरी जिल्ह्यातील ५२ गावांमध्ये कातळशिल्पे सापडली आहेत. रत्नागिरी जिल्ह्यातील रत्नागिरी, लांजा, राजापूर परिसरातएक हजारपेक्षा अधिक कातळशिल्पे असून, या प्रत्येक रचना भिन्न आहेत.मंडणगड व गुहागर तालुक्यातही कातळशिल्पे सापडली आहेत. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील देवगड तालुक्यातही काही रचना सापडल्या आहेत. गेल्या दोन महिन्यात सात हजारपेक्षा अधिक पर्यटकांनी या कातळशिल्पांना भेटी दिल्या आहेत. त्यामध्ये विदेशी पर्यटकांचाही समावेश आहे. आॅस्ट्रेलिया, फ्रान्स, इंग्लंड, अमेरिकेतील पर्यटक याठिकाणी भेट देत आहेत. ही सर्व अश्मयुगीन काळातील कातळचित्रआहेत.
🔹चुंबकीय विस्थापन🔹
राजापूर तालुक्यातील देवाचेगोठणे येथे २.२५ मीटर त्रिज्येचे वर्तुळ काढण्यात आले असून, इथं चुंबकीय विस्थापन आढळते. ज्याठिकाणी मनुष्याकृती कोरली आहे तिथे चुंबकसूची पूर्णपणे विरूध्द दिशा दाखवते. गोगटे - जोगळेकर महाविद्यालयाचे प्रा. डॉ. सुरेंद्रठाकूरदेसाई यांनी याबाबत केलेल्याप्राथमिक चाचण्यांमध्ये विशिष्ट अणूरचनेमुळे चुंबकसुई स्थिर राहत नाही. ती विरूध्द दिशा दाखवते, हे स्पष्ट झाले आहे.

उत्तर लिहिले · 17/6/2020
माहिती सेवा ग्रूप अनिल पाटील पेठवडगाव कोल्हापूर
कर्म · 333615
कोकणात अनेक ठिकाणी कातळशिल्प आहेत. त्यापैकी काही प्रमुख ठिकाणे खालीलप्रमाणे आहेत:

रत्नागिरी जिल्हा:
गणेशगुळे: येथे विविध प्रकारची कातळशिल्पे आहेत.

बारसू: बारसू येथील कातळशिल्पे जागतिक स्तरावर प्रसिद्ध आहेत. टाइम्स ऑफ इंडियामधील बातमी

देवरुख: देवरुखमध्येही काही कातळशिल्पे आढळतात.

सिंधुदुर्ग जिल्हा:
फोंडाघाट: फोंडाघाट येथे अनेक दुर्मिळ कातळशिल्पे आहेत.

कुडोपी: कुडोपीमध्येही काही सुंदर कातळशिल्पे आहेत.

या व्यतिरिक्त, कोकणातील अनेक गावांमध्ये कातळशिल्पे विखुरलेली आहेत.


marathi.freepressjournal.in
रत्नागिरीतील देऊडमधील कातळशिल्प अखेर संरक्षित स्मारक, पर्यटकांकरिता ठरले नवे आकर्षण
Swapnil S
~2 minutes
रत्नागिरीतील देऊडमधील कातळशिल्प अखेर संरक्षित स्मारक

Published on: 

11 Aug 2024, 10:15 am

मुंबई : राज्यातील ऐतिहासिक वास्तूंचे जतन करण्यासाठी पुढाकार घेणाऱ्या राज्य सरकारने रत्नागिरी जिल्ह्यातील देऊड कातळशिल्प ‘संरक्षित स्मारक’ म्हणून घोषित करण्यात आहे. राज्य सरकारच्या पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभागाने यासंदर्भातील अधिसूचना जारी केली आहे.

रत्नागिरीसह राजापूर तालुक्यात अश्मयुगीन कातळशिल्प आढळून आली आहेत. राज्याच्या पर्यटन व सांस्कृतिक कार्य मंत्रालयाच्या पुरातत्त्व आणि वस्तुसंग्रहालय संचालनालयाच्या संचालकांच्यामार्फत कातळशिल्प परिसराचा व्यवस्थापन आणि विकास उपक्रम हाती घेण्यात आला आहे.

या उपक्रमांतर्गत कातळशिल्प संरक्षित स्मारक म्हणून जाहीर केली जात आहेत. रत्नागिरी जिल्ह्यातील देऊड येथे प्रसाद शंकर आपडे यांच्यासह काहींच्या मालकीच्या जागेत कातळशिल्प आढळून आले होते.

ते संरक्षित स्मारक करण्याची घोषणा शासनाने केली होती. यासंदर्भात हरकती आणि सूचना मागवण्यासाठी दोन महिन्यांची मुदत दिली. मात्र, त्याला प्रतिसाद न मिळाल्याने शासनाने अखेर संरक्षित स्मारक म्हणून हे कातळशिल्प जाहीर केल्याचे शासनाच्या अधिसूचनेत नमूद करण्यात आले आहे.

कातळशिल्प परिसरातील ३१० चौरस मीटर क्षेत्रफळ जागा संरक्षित

देऊड येथे कोरलेले मध्याश्मयुगीन कातळशिल्प आढळले आहे. या कातळावर एकशिंगी गेंडा, गाढव, वानर, हरिण आणि इतर पावलांचे ठसांचे चित्र रेखाटण्यात आली आहेत. एकूण १० बाय १० चौरस मीटर असे एकूण १०० चौरस मीटर इतके आहे. पूर्वेला ५, पश्चिमेला ५, दक्षिणेला ५ आणि उत्तरेला ५ मीटर जागा आहे. कातळशिल्प परिसरातील ३१० चौरस मीटर क्षेत्रफळ जागा संरक्षित स्मारक म्हणून घोषित करण्यात आली.

ratnagirikhabardar.com
आंतरराष्ट्रीय परिषदेत कोकणातील कातळशिल्प विषयावर चार शोधनिबंधांचे सादरीकरण - Ratnagiri Khabardar
~3 minutes


रत्नागिरी : जागतिक पुरातत्त्व काँग्रेसद्वारा आयोजित डार्विन, ऑस्ट्रेलिया येथे झालेल्या दहाव्या आंतरराष्ट्रीय परिषदेत कोकणातील कातळशिल्प या विषयावर आधारित चार शोधनिबंधांचे सादरीकरण करण्यात आले. कोकणातील कातळशिल्प आणि वारसा संशोधन केंद्राच्या रत्नागिरी टीमतर्फे तीन शोधनिबंधांचे ऑनलाइन व कोळोशी अश्मयुगीन गुहा पुरातत्वीय उत्खनन टीमतर्फे ऑस्ट्रेलियात जाऊन एका शोधनिबंधाचे सादरीकरण केले आहे. यामुळे आंतरराष्ट्रीय स्तरावर कोकणातील कातळशिल्पांचे आश्वासक पाऊल पडले आहे.

रत्नागिरीत कातळशिल्प, शोध व संशोधनासाठी शोधकर्ते सुधीर रिसबूड, धनंजय मराठे, डॉ. सुरेंद्र ठाकुर-देसाई यांनी २०१२ पासून सुरुवात झाली. २०१५ पासून कातळशिल्प मिळायला सुरुवात झाली. शोध कर्त्यांनी एकेक कार्यकर्ते जोडले आणि गेल्या २०० पेक्षा अधिक ३००० च्या घरात चित्रे सापडली आहेत. त्यानंतर कातळशिल्पांचे जागतिक वारसास्थळामराठी नामांकन झाले. रत्नागिरीत वारसा संशोधन केंद्र सुरू झाले, ही मोठी घडामोड आहे.

संथ आणि सुरक्षित गतीने रॉक आर्ट संशोधन आणि सराव, पुरातनता आणि सातत्य, दस्तऐवजीकरण, पुरातनता आणि सहसंबंध आणि व्यापार, स्थलांतर, वसाहत नेटवर्क या चार संकल्पनांवर शोधनिबंधांचे सादरीकरण करण्यात आले, टीममधील

तरुण अभ्यासकांनी संशोधन निबंध सादरीकरण करावे विचारातून दिव्यांश सिन्हा, तार्किक खातू यांनी टीम कोकणातील कातळशिल्प आणि वारसा संशोधन केंद्राच्यावतीने कोकणातील कातळशिल्प या विषयावर शोधनिबंधाचे ऑनलाइन सादरीकरण केले. आतापर्यंत झालेले काम हे पूर्णपणे लोकसहभागातून झाले आहे. त्याचे महत्व लोकांपर्यंत पोहोचणं गरजेचे होते. त्याबाबतचे वाचन निसर्गयात्री संस्थेच्या सभासदांच्यावतीने ऋत्विज आपटे यांनी केले.

कोळोशी टीमच्यावतीने प्रा. पार्थ चौहान यांनी कोळोशी अश्मयुगीन गुहा उत्खनन या विषयावर प्रत्यक्ष ऑस्ट्रेलिया येथे जाऊन शोधनिबंधाचे सादरीकरण केले. सातत्याने अखिलेश झा, डॉ. तेजस गर्गे, डॉ. सुरेंद्र ठाकूरदेसाई यांनी पाठबळ दिले.

दोन हजार जणांचा सहभाग
१९८६ पासून दर चार वर्षांनी ही परिषद भरवली जाते. ऑस्ट्रेलियातील फ्लिंडर्स विद्यापीठ आणि डार्विन विद्यापीठ या ठिकाणी याचे आयोजन यंदा केले. जगभरातून दोन हजारांहून अधिक अभ्यासक, विद्यार्थी आणि प्राध्यापकांनी यात भाग घेतला.

या आंतरराष्ट्रीय परिषदेत कोकणातील कातळशिल्प या विषयावर आधारित शोधनिबंध सादरीकरणाची संधी मिळाली, याचा आनंद आहे. या शोधनिबंधाद्वारे कातळशिल्प, संबंधित पुरावे आणि कालखंड अधोरेखित करण्यात आहे. जागतिक पटलावर एकावेळी विविध आयामांनी सादर केलेल्या कातळशिल्प विषयाला अत्यंत व्यापक व सकारात्मक प्रतिसाद मिळाला. – सुधीर रिसबूड.

marathi.indiatimes.com
दापोली, मंडणगडमध्येही कातळशिल्पांचा वारसा, मानवाकृतीसोबत हरणे आणि बैलांची चित्रे, लवकरच रहस्य उलगडणार
सूरज कोळेकर
3–4 minutes
दापोली, मंडणगडमध्येही कातळशिल्पांचा वारसा, मानवाकृतीसोबत हरणे आणि बैलांची चित्रे, लवकरच रहस्य उलगडणार
Edited by: सूरज कोळेकर|महाराष्ट्र टाइम्स•3 Mar 2024, 2:24 pm

Chiplun News: दक्षिण रत्नागिरीतील राजापूर आणि लांजाप्रमाणेच आता उत्तर रत्नागिरीतील दापोली आणि मंडणगड येथे कातळशिल्पे आढळली आहेत. या कातळशिल्पांवर मानवाकृतीसोबतच हरणे आणि बैल प्राण्यांचे चित्रे आहेत
हायलाइट्स:
दापोली-मंडणगडमध्येही कातळशिल्पांचा वारसा
मानवाकृतीसोबत हरणे आणि बैलांची चित्रे
मानवाला शेतीचा शोध लागल्यानंतरची कातळशिल्पे असल्याचा अंदाज
दापोलीतील उंबर्ले गावातील कातळसड्यावर सापडलेले कातळशिल्प
दापोलीतील उंबर्ले गावातील कातळसड्यावर सापडलेले कातळशिल्प (फोटो- महाराष्ट्र टाइम्स)
म. टा. वृत्तसेवा, चिपळूण: आजवर केवळ दक्षिण रत्नागिरीत राजापूर, लांजा परिसरात सापडलेली कातळशिल्पे आता उत्तर रत्नागिरीत दापोली व मंडणगड तालुक्यांतही आढळली आहेत. दापोलीतील उंबर्ले गावातील कातळसड्यावर सापडलेले कातळशिल्प अत्यंत कुतुहलजनक आहे. तर मंडणगड तालुक्यातही कातळशिल्पाचा अभ्यास सुरू करण्यात आला आहे. डॉ. अजय धनावडे यांनी या ठिकाणी भेट देत, त्यांची मोजमापे, छायाचित्र घेत अभ्यास सुरू केला आहे. यामुळे या कातळशिल्पांचे रहस्य उघडणार आहे.उंबर्ले गावात 'गाढवाचा खडक' म्हणून ओळखल्या जाणाऱ्या जांभ्या सड्यावर शिल्पसमूहात सहा कातळशिल्पे आढळली आहेत. यात एका मानवाकृतीसोबत तीन हरणे व दोन बैल या प्राण्यांची चित्रे आहेत. मानवाकृती सुमारे साडेचार मीटर लांबीची आहे. तिच्या डोक्यावर शिरस्त्राण अथवा पागोट्यासारखा आकार असून त्यावर झाडाच्या सरळ फांदीसारखी रचना दिसते. कोकणात आतापर्यंत आढळलेल्या कातळशिल्पांमध्ये बैल हा प्राणी आढळला नव्हता. शिंग आणि वशिंडधारी असे हे दोन बैल आहेत. त्यामुळे ही कातळशिल्पे आजपासून किमान पाच ते सहा हजार वर्षांपर्यंतच्या काळातील असावीत, असा अंदाज करता येतो. बैल हा प्राणी असल्याने, या शिल्पांचा कालावधी हा नवाश्मयुगीन, म्हणजे मानवाला शेतीचा शोध लागला त्या काळातील असावा, असा अंदाज आहे. अर्थातच यासाठी सूक्ष्म अभ्यासाची गरज असल्याचे डॉ. धनावडे यांनी नमूद केले.

मंडणगड तालुक्यातील गोठे, धामणी, बोरखत, वेरळ या चार गावांच्या सीमेवरील वाघाचा कातळ या ठिकाणी आढळून आलेल्या कातळशिल्पाचा तोंडाकडचा भाग भग्नावस्थेत असल्याने तो डुक्कर किंवा गेंडा असण्याची शक्यता आहे. मंडणगड तालुक्यात आजवर कातळशिल्पांची नोंद झालेली नव्हती. मात्र सावित्री नदीच्या दक्षिण काठावरील गावांच्या सड्यावर हे उल्लेखनीय शिल्प आढळल्याने अभ्यासाला वेगळी दिशा मिळणार आहे. माणूस शिकारी अवस्थेत, भटक्या वृत्तीचा होता, त्या काळातील त्याच्या बुद्धीचा आवाका आणि उपलब्ध साधनांआधारे ही चित्रे त्याने कोरली. अशाच पद्धतीची आणखी कातळशिल्पे या परिसरात असण्याची शक्यता आहे. त्यांचा शोध सुरू आहे.

कातळशिल्पे ही कोकणात केवळ जांभ्या सड्यावर आढळली आहेत. कोकणातील कातळशिल्पे अश्मयुगीन काळातील असून त्यांचा कालखंड मध्यअश्मयुगीन असून आजपासून सुमारे दहा हजार वर्षे ते तीन हजार वर्षे इतका जुना असण्याची शक्यता मानली जाते.

२०० प्रकार, एक हजारहून अधिक वृक्षांचं संवर्धन; पर्यावरण प्रेमींनी अडीच एकरात उभारलं ऑक्सिजन पार्क

जतन व्हावे
कातळशिल्पे ही कोकणातील अश्मयुगीन मानवाच्या अस्तित्वाच्या खुणा आहेत, हे आता सर्वमान्य झाले आहे. पुरातत्त्व आणि वस्तुसंग्रहालय विभाग (महाराष्ट्र राज्य), कोकण इतिहास परिषद, निसर्गयात्री संस्था रत्नागिरी, देवगड अभ्यास मंडळ देवगड अशा अनेक सरकारी व स्वयंसेवी संस्थांनी तसेच अनेक हौशी भटक्यांनी ही शिल्पे शोधली आहेत. या कातळशिल्पांचे सरकारकडून जतन व्हावे, अशी प्रतिक्रिया अभ्यासक डॉ. अजय धनावडे यांनी दिली. कातळशिल्पे पाहण्यासाठी येणाऱ्यांची संख्या दिवसागणिक वाढणार असल्याने, या शिल्पांचे नुकसान होणार नाही, याची काळजी घेणे आवश्यक आहे.

pudhari.news
सिंधुदुर्ग : धामापूर गावात आढळली कातळशिल्पे
मोहन कारंडे
3–4 minutes
Published on: 

02 Aug 2023, 9:51 am

Updated on: 

02 Aug 2023, 2:13 pm

मालवण; पुढारी वृत्तसेवा : मालवण तालुक्यातील धामापूर गावच्या सड्यावर कातळशिल्पांच्या पाऊलखुणा आढळून आल्या आहेत. सद्यस्थितीत सड्यावरील कातळावर दोन ठिकाणी चार कातळशिल्पांच्या चित्रकृती निदर्शनास आल्या असून इतिहास संशोधकांना संशोधनासाठी इतिहासाचा आणखी एक खजिना सापडला आहे.

मालवण तालुक्यातील धामापूर गाव हे एक निसर्गरम्य ठिकाण आहे. सदैव हिरवीगार असणारी घनदाट जंगले, नारळ-पोफळीची झाडे आहेत. दुतर्फा डोंगराच्याच मधोमध वसलेला ऐतिहासिक तलाव ही या गावची वैशिष्ट्य आहेत. तलावाच्या काठावर श्री भगवती देवीचे प्राचीन देवालय आहे. अलीकडेच धामापूर तलावाला 'वर्ल्ड हेरिटेज इरिगेशन साईट'चा दर्जा देऊन महाराष्ट्राचा जागतिक सन्मान करण्यात आला आहे. त्यामुळे ऐतिहासिक आणि प्राचीन पार्श्वभूमी असलेल्या धामापूरमध्ये कातळशिल्पांचा खजिना सापडल्याने हेरिटेज टुरिझमसाठी नवे द्वार खुले होणार आहे.

धामापूर, मोगरणे आणि साळेल या तिन्ही गावांच्या लांबलचक सड्यावर ही कातळशिल्पे दिसून आली आहेत. धामापूर गावच्या गोड्याचीवाडीच्या हद्दीत ही कातळशिल्पे आढळून आली आहेत. "कातळशिल्पे दोन-चार ठिकाणी आहेत, याबाबत आम्हाला कल्पना आहे. मात्र त्याबद्दल सविस्तर माहिती नाही," असे स्थानिक ग्रामस्थांनी सांगितले. धामापूर तलाव आणि कातळशिल्पांचा प्राचीन ठेवा पर्यटनदृष्ट्या पर्वणी ठरणारा असून कातळशिल्पाच्या चित्रकृतीचा उलगडा होणे आवश्यक आहे.

साळेल गावचे ग्रामस्थ परेश गावडे, नंदू गावडे, गणेश गावडे हे धामापूर सडा परिसरात 'अळंबी' काढण्यासाठी फिरत असताना त्यांना ही कातळशिल्प निदर्शनास पडली. त्यांनी पत्रकार सिद्धेश आचरेकर यांना याबाबत माहिती दिली. पत्रकार आचरेकर यांनी धामापूर सड्यावर परेश गावडे यांच्या समवेत जाऊन कातळशिल्पांची पाहणी केली. याठिकाणी असलेली ख्रिस्ती धर्मातील 'क्रॉस'च्या आकाराची चित्रकृती निदर्शनास येण्यासाठी आचरेकर, गावडे, अनिकेत पाटील (डोंबिवली) यांनी त्या चित्रकृतीच्या बाजूने गोलाकार दगड ठेवले. बाजूलाच गोलाकार स्थितीत कातळशिल्प कोरलेले आहे. त्याच ठिकाणाहून ५०० मीटरवर आणखीन एक भव्य कातळशिल्प कोरलेले आहे.

साळेलमधील युवकांकडून जागरूकता
साळेल गावातील युवकांनी ही कातळशिल्पे उजेडात आणली. कातळशिल्पांच्या सभोवताली युवकांनी साफसफाईदेखील केली आहे. मात्र पावसाळ्यात मोठ्या प्रमाणात या परिसरात गवत उगवत आहे. कातळशिल्प आढळून आलेल्या परिसरात चिरेखाणी असल्याने कातळशिल्पे नष्ट होऊ शकतात. त्यामुळे अमूल्य ठेवा जोपासण्यासाठी पुढाकार घेणे आवश्यक आहे. कातळशिल्पांच्या ठिकाणी पोहचण्यासाठी साळेल, मोगरणे गावातून रस्ता आहे.

मालवण तालुक्यात सर्वाधिक कातळशिल्पे
बहुतांशी कातळ शिल्पे ही उंच अशा माळरानावर म्हणजेच सड्यावरील कातळात कोरलेली असल्याने त्यांना कातळ शिल्पे असे संबोधले जाते. मालवण तालुक्यात आणखी काही ठिकाणी अशा प्रकारची कातळशिल्पे सापडू शकतात. मात्र अशा शिल्पांबाबत ग्रामस्थांमध्ये तेवढी जागरूकता व माहिती दिसून येत नाही. मात्र अशा शिल्पांचा शोध घेणे गरजेचे असून इतिहास संशोधकांची यामध्ये महत्वाची भूमिका राहणार आहे.

daryafirasti.com
कोकणातील अद्भुत कातळशिल्पे
chinmayebhave
4–6 minutes

कशेळीच्या डोंगरसड्यावरचा हा अजस्त्र हत्ती… आणि त्यात कोरलेली असंख्य चित्रे … विविध प्राणी … काही जलचरही .. काय सांगत असतील ही चित्रे? कोकणात दर्या फिरस्ती प्रकल्पासाठी हिंडत असताना कोकणातील कातळशिल्पांबद्दल मला समजलं आणि त्याबद्दल उत्सुकता होतीच. मध्यंतरी बीबीसी मराठी आणि अगदी न्यूयॉर्क टाइम्स ने ही या विषयाची दखल घेतली आहे. या जमिनीला कॅनव्हास करून खोदलेल्या कातळशिल्पांचा आकार इतका मोठा आहे की फोटो काढायला काही ठिकाणी ड्रोन असेल तरच त्यातील रेषा आणि चिन्हे एका दृष्टीक्षेपात नीट दिसतील. दर्या फिरस्ती म्हणजे कोकणच्या दृश्य संस्कृतीच्या प्रत्येक पैलूचे चित्रण मग इतक्या महत्वाच्या पुरातत्व ठेव्याचे चित्रण तर अजून मोठी जबाबदारी ठरते. ही चित्रे रत्नागिरी जिल्ह्यात उक्षी सारख्या उत्तरेतील ठिकाणापासून देवाचे गोठणे सारख्या दक्षिणेकडील ठिकाणाच्याही पुढे दीड दोनशे किलोमीटरच्या टप्प्यात विखुरलेली आहेत. आणि हे अंतर सरळ रेषेतल्या महामार्गाने मोजायचे नाही बरं का! काल आम्ही ५ साईटचे फील्डवर्क केले त्याला संपूर्ण दिवस लागला.


Kolambe petroglyph
रत्नागिरी जिल्ह्यात सह्याद्रीची सुटावलेली टोके अगदी समुद्राला जाऊन भिडलेली आहेत. नकाशात बाजूला ५-६ किलोमीटर दिसणारे गाव गाठायला दोन टेकड्या चढून उतरून नागमोडी वळणाच्या रस्त्याने जावे लागते. काही ठिकाणी ही कातळशिल्पे दूर एकांत ठिकाणी सड्यावर आहेत … तर काही ठिकाणी खासगी जमिनीवर घरांच्या प्लॉट्स च्या मधोमध. २०१२ पासून सुधीर रिसबूड आणि धनंजय मराठे या दोघांनी अशी १२०० कातळशिल्पे शोधून काढली आहेत. आता महाराष्ट्राचे पुरातत्व निर्देशक डॉ तेजस गर्गे आणि नव्या दमाचा आर्किओलॉजिस्ट ऋत्विज आपटे या कातळशिल्पांवर सरकारी आणि संशोधनाच्या दृष्टीने बहुमोल काम करत आहेत. सुमारे १० हजार ते ४० हजार वर्षे जुनी असण्याची शक्यता असलेली ही कातळशिल्पे कोकणच्या इतिहासाची दालने उघडू शकतील. इथं विविध प्राणी आहेत, त्यांच्या आत कोरलेले प्राणी आणि चिन्हे आहेत. मनुष्य आकृती आहेत आणि abstract किंवा अमूर्त चित्रेही आहेत.


Kolambe petroglyph
ही चित्रे खोदण्यामागचं प्रयोजन काय? या ओळखीच्या खुणा असतील की संदेश? एकच चित्र कुठं पुन्हा दुसरीकडे सापडते आहे असं नाही मग या चित्रभाषेला अर्थ असेल का? की हा तेव्हाच्या सांस्कृतिक/ धार्मिक कर्मकांडाचा भाग असेल? यात असलेले प्राणी पूर्वी कोकणात असतील का? या चित्रांमध्ये कुठेही शेती नाही … मग प्राणी आहेत म्हणजे शिकार करून जगणाऱ्या मानवाचा ठेवा आहे का हा? जितकं जास्त या चित्रांबद्दल समजेल, कुतूहल आणि गूढरम्यता तितकीच अजून वाढत जाणार आहे.


Nivali petroglyph
संशोधन सुरु आहे … जतन सुरु आहे .. नवीन कातळशिल्पे सापडत आहेत … त्याबद्दल उत्सुकता वाढत आहे आणि पर्यटन सुरु होते आहे. जिथं कातळशिल्पे खासगी जमिनीवर आहेत तिथं प्रश्न आर्थिकही आहेत … या चित्रांना पाहायला येणाऱ्या लोकांच्या पर्यटनातून कोकणच्या आर्थिक व्यवस्थेलाही लाभ आहे … कधीकधी छंद म्हणून सुरु झालेले वेडे प्रवास माणसाला आणि त्याच्याबरोबरच्या अनेकांना खूप दूर घेऊन जातात.


Rundhyetali petroglyph
देवीहसोळ येथे आर्यादुर्गा देवीचे मंदिर प्रसिद्ध आहे. त्या देवळासमोरच एक अमूर्त पद्धतीचे कातळशिल्प आहे. हे बरेच आतवर खोदलेले कोरीवकाम आहे. कोणती हत्यारे किंवा तंत्रज्ञान वापरून ही कातळशिल्पे खोदली गेली असावीत याबद्दलही कुतूहल निर्माण होते. स्थानिक मंदिरांच्या दंतकथा आणि कर्मकांडांमध्ये या शिल्पांना स्थान मिळालेले आहे. आजही या कातळशिल्पांचा आकार, त्यामधील प्रमाणबद्धता थक्क करणारी आहे.


Devihasol petroglyph
देवाचे गोठणे या ठिकाणी असलेल्या कातळशिल्पाची अजून एक गंमत आहे. शिल्प दिसायला तसे साधेच आहे. मानवी आकृतीचे पाय इथं दिसतात. पण इथं जर होकायंत्र ठेवलं तर त्याला उत्तर दिशा दाखवणे जमत नाही. काट्याची गडबड होते.


बारसू इथं खोदलेल्या कातळशिल्पांमध्ये व्याघ्रप्रतिमा दिसतात आणि सोबत मानवी आकृती दिसते. ही देवतेची कल्पना आहे का? की शिकारीचे चित्रण? गेंडा किंवा पाणघोडा असे कोकणात ज्ञात नसलेले प्राणीही अनेक ठिकाणी कातळशिल्पांमध्ये आहेत. हा मानव स्थलांतरित होता म्हणून हे प्राणी दिसतात का? की पूर्वी कोकणात हे प्राणी होते. कितीतरी प्रश्न अनुत्तरित आहेत आणि संशोधनाचे आव्हान आपल्यासमोर ठेवत आहेत.


Barsu petroglyph
काही आकृती इतक्या विलक्षण आहेत की या रेखांकनापासून प्रेरणा घेऊन एखादा एम एफ हुसेन, दीनानाथ दलाल, पिकासो नवीन फॉर्म्स असलेली चित्रे निर्माण करू शकेल.


Barsu petroglyph
मला सगळ्यात विलक्षण वाटलेली गोष्ट म्हणजे काही कातळशिल्पांमध्ये खोल समुद्रात आढळणारे प्राणीसुद्धा रेखलेले दिसतात. स्टिंग रे, शार्क .. त्यांच्या मूळ आकारात आणि अतिशय बारकावे अभ्यासून चित्रित केलेले. सगळंच फोटोत दाखवलं तर पाहण्यात काय गंमत आहे. तेव्हा तुम्हाला आवाहन करतोय की कोकण भ्रमंतीचा बेत जमवा आणि ही कातळशिल्पे आवर्जून पहा. आणि हे करत असताना स्थानिकांची मदत नक्की घ्या.

सुधीर (भाई) रिसबूड निसर्गयात्री संस्थेच्या माध्यमातून इथं बरंच काम करत आहेत. त्यांचे मार्गदर्शन घेऊन या आदिम मानवाच्या किमयेचा आनंद घ्या. सुधीर रिसबूड यांचा क्रमांक +९१९४२२३७२०२०

ratnagirikhabardar.com
गुहागर : रानवी येथील सड्यावर सहा कातळशिल्प - Ratnagiri Khabardar
~3 minutes


गुहागर : निसर्ग संरक्षणासाठी गेल्या काही वर्षापासून काम करत असलेल्या येथील सह्याद्री संवर्धन व संशोधन संस्थेच्या तीन सदस्यांना जंगलभ्रमंती दरम्यान गुहागर तालूक्यातील रानवी येथील कातळसडयावर एक नव्हे, दोन नव्हे तब्बल सहा कातळशिल्प प्रतिकृतींच्या पाऊलखुणा दिसून आल्या आहेत. एका भागात, दोन ठिकाणा प्रत्येकी तीन, त्याही वेगवेगळया रूपात सापडलेल्या तब्बल सहा प्रतिकृतींमुळे कातळशिल्प संशोधकांना संशोधनासाठी इतिहासाचा आणखी एक खजिना सापडला आहे. सध्या संस्थेसह पुणेतील अभ्यासकांच्या माध्यमातून या कातळशिल्पांच्या अभ्यास सुरू आहे.

अवघ्या महाराष्ट्रात निसर्ग संरक्षण, पर्यावरण, वन्यजीवरक्षण, वणवामुक्ती, जंगल पर्यटन याशिवाय आदिवासी पाडयांच्या अडाणीत धावणाऱ्या सह्याद्री संवर्धन व संशोधन संस्थाच्या सदफ कडवेकर, राणी प्रभुलकर आणि शुभम कुरधुंडकर यांचे काम मोठे आहे. गेल्या अनेक वर्षापासून सहयाद्रीच्या खोऱ्यात ते निसर्ग संरक्षण आणि वन्यजीवांसाठी काम करत आहेत. जंगल भटकंती करत असताना रानवी येथील जंगलात मधोमध असलेल्या कातळावर ही शिल्पे आढळून आली आहेत.

रानवी गावाला विस्तीर्ण कातळसडा तसेच देखणी किनारपट्टी लाभली आहे. पावसाळ्यात खुलून येणारे, जैवविविधतेने नटणारे हे माळरान फार लक्षवेधी असते. तेच माळरान पावसाळ्यानंतर मात्र उजाड दिसू लागते. पण अशाच या उजाड आणि निरुपयोगी वाटणाऱ्या माळरानाने अशा प्रकारचा अनोखा ऐतिहासिक वारसा आपल्या कुशीत जपलेला आढळून आला आहे. कोकणातील ही कातळ कोरीव शिल्पे स्वतच्या अस्तित्वाच्या खुणांसोबत बरेचसे प्रश्न उपस्थित करत असल्याने त्याकडे अभ्यासकांचं लक्ष वेधलं गेलेलं आहे.

कातळशिल्पांमध्ये कोकणातील पठारी जैवविविधता तसेच समुद्रीजीवन आणि याव्यतिरिक्त हत्ती, गेंडा यांसारख्या महाकाय प्राण्यांचे आकार आढळलेले आहेत. तसेच त्यावेळच्या प्रवासादरम्यानच्या घटना या शिल्पांमध्ये पाहायला मिळतात. अनेक प्रतिकृतांया आकारांचे अर्थ अद्यापही उलगडलेले नाहीत. रानवी येथेही चारही बाजूने जंगल आणि मधोमध असलेल्या कातळसडयावर दोन ठिकाणी प्रत्येकी तीन याप्रमाणे सहा शिल्प आढळून आली. त्यामध्ये दोन शिल्प प्रतिकृती या मानवी आकाराया असून अन्य चार प्रतिकृतींचे अर्थ उलगडताना दिसत नाहीत. त्यासाठी सह्याद्री संवर्धन व संशोधन संस्थाच्या माध्यमातून त्याबरोबर पुणे येथील कातळशिल्प अभ्यासक मिलिंद वाटवे यांच्या माध्यमातूनही अभ्यास सुरू आहे.


zeenews.india.com
रत्नागिरितील देउडमधील कातळशिल्प अखेर संरक्षित स्मारक; या कातळशिल्पात नेमकी कसली चित्र
Mansi kshirsagar
2–3 minutes
रत्नागिरितील देउडमधील कातळशिल्प अखेर संरक्षित स्मारक; या कातळशिल्पात नेमकी कसली चित्र
Geoglyphs In Konkan: रत्नागिरीतील देऊडमध्ये सापडलेली कातळशिल्प अखेर संरक्षित स्मारक म्हणून घोषित करण्यात आली आहेत. 
रत्नागिरितील देउडमधील कातळशिल्प अखेर संरक्षित स्मारक; या कातळशिल्पात नेमकी कसली चित्र

Ancient Maharashtra rock art in ratnagiri declared protected monument

Geoglyphs In Konkan: कोकणात अनेक ऐतिहासिक स्थानं आहेत. हा ऐतिहासिक ठेवा जपण्यासाठी अनेक स्तरावर प्रयत्न केले जातात. कोकणातील अनेक भागात कातळशिल्प मोठ्या प्रमाणात आढळतात. अश्मयुगीन काळातील ही काताळशिल्प म्हणजे जणू गुढच आहे. इतिहासपूर्व काळातील मानवी संस्कृतीच्या या पाउलखुणा आहेत. कोकणातील कातळशिल्प ही संरक्षित स्मारक म्हणून घोषित करण्यात आले आहे. त्यात आता आणखी एका कातळशिल्पाची भर पडली आहे. राज्य सरकारने रत्नागिरी जिल्ह्यातील देउड कातळशिल्प संरक्षित स्मारक म्हणून घोषित केले आहे. पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभागाने यासंदर्भात अधिसूचना जारी केली आहे. 

रत्नागिरीसह राजापूर तालुक्यातील अश्मयुगीन कातळशिल्प आढळून आली आहेत. राज्याच्या पर्यटन व सांस्कृतिक कार्य मंत्रालयाच्या पुरातत्व आणि वस्तुसंग्रहालय संचालनायाच्यामार्फत कातळशिल्प परिसराचा व्यवस्थापन आणि विकास उपक्रम हाती घेण्यात आला आहे. त्याअंतर्गंत कातळशिल्प संरक्षित स्मारक म्हणून जाहीर केले जात आहेत. 

रत्नागिरी जिल्ह्यातील देउड येथे प्रसाद शंकर आपडे यांच्यासह काहींच्या मालकीच्या जागेत कातळशिल्प आढळून आले होते. हे कोरलेले मध्याश्मयुगीन कातळशिल्प आहे. या कातळावर एकशिंगी गेंडा, गाढव, वानर, हरिण आणि इतर पावलांचे ठसे रेखाटण्यात आले आहे. एकूण 10 बाय 10 चौरस मीटर असे एकूण 100 चौरस मीटर इतके आहेत. कातळशिल्प परिसरातील 310 चौरस मीटर क्षेत्रफळ जागा संरक्षित स्मारक म्हणून घोषित केली आहे. रत्नागिरीत देउड येथे सापडेले काताळशिल्प हे मध्यमपाषाण युगातील आहेत म्हणजेच जवळपास 20,000 ते 10,000 वर्षांपूर्वीचे आहेत. 

महाराष्ट्र व गोव्याजवळ 900 किमी क्षेत्रावर हे कातळशिल्प पसरले आहेत. फक्त रत्नागिरीतच 70 ठिकाणी 1,500 हून अधिक अशा कलाकृती आहेत. ज्यातील सात कलाकृतींना युनेस्कोने संरक्षित स्मारक म्हणून मान्यता दिली आहे. कोकणातील ही कातळशिल्पे अरबी समुद्र आणि लगतचा सह्याद्री या भूभागातील रत्नागिरी ते सिंधुदुर्ग परिसरातील जवळपास १७० किमी लांब आणि २५ किमी रुंद पट्ट्यात आढळली आहेत

evivek.com
कोकणातील कातळशिल्पे
विवेक मराठी
15–19 minutes
@ऋत्विज आपटे

कोकणाला निसर्गाचा वरदहस्त लाभलेला आहे. विस्तीर्ण समुद्रकिनारे, नारळीपोफळीची झाडे, प्राचीन मंदिरे, त्यासोबतच अजून टिकवून ठेवलेल्या सणांच्या आणि उत्सवांच्या परंपरा. भारतीय उपखंडात बाहेरच्या देशांतील येणार्‍या पर्यटकांचे मूळ आकर्षणबिंदू म्हणजे पहिले नैसर्गिक आणि दुसरे म्हणजे सांस्कृतिक आणि ऐतिहासिक. कोकण किनारपट्टीत ही दोन्ही संसाधने मुबलक आहेत. हे पर्यटनाचे आकर्षणबिंदू असले तरी या गोष्टींच्या पल्याड जाऊन अशा अनेक ऐतिहासिक वारसा असलेल्या कित्येक गोष्टी कोकणात लुप्त होऊन बसलेल्या आता समोर येताना दिसत आहेत. त्यातील अश्मयुगीन म्हणावा असा वारसा गेल्या काही वर्षांत कोकणात समोर येताना दिसतो आहे, तो म्हणजे कातळखोद चित्र (कातळशिल्प) रूपाने. अश्मयुगीन मानवाने त्याच्या भावभावनांचा मांडलेला एक मोठा पट म्हणजे कातळखोद.

Katal Shilp Konkan

महाराष्ट्राच्या पश्चिम भागात अरबी समुद्राशी संलग्न असलेली 720 किलोमीटर लांब आणि अंदाजे 30 किलोमीटर रुंद किनारपट्टीचा भाग म्हणजेच कोकण किनारपट्टी. निसर्गसंपन्न आणि विविध सांस्कृतिक रहस्ये दडवून असलेला हा भाग म्हणजे वारसा पर्यटनासाठी एक आतापर्यंत कधीही जगासमोर न आलेला भाग आहे. कोकणातील पर्यटन हे साधारणपणे सामान्य नागरिकांसाठी समुद्रकिनारे, खाद्यसंस्कृती आणि धार्मिक बाबींवर चालणारे आहे. दक्षिण कोकणातील सिंधुदुर्ग हा जिल्हा महाराष्ट्रातला पहिला पर्यटन जिल्हा म्हणून प्रसिद्धीस आला. त्याच्या पावलावर पाऊल ठेवून आता संपूर्ण कोकण हळूहळू पर्यटनावर भर देऊ पाहात आहे जी एका दृष्टीने अत्यंत आनंदाची बाब आहे. कोकणाला निसर्गसंपन्न किनारा आहे, नारळीपोफळीचे वरदान आहे, सोबतच ह्या ठरावीक गोष्टींच्या पल्याड जाऊन अशा अनेक ऐतिहासिक वारसा असलेल्या कित्येक गोष्टी कोकणात लुप्त होऊन बसलेल्या आता समोर येताना दिसत आहेत. एवढे सगळे असूनसुद्धा म्हणावी तशी पर्यटनवृद्धी काही कोकणात झालेली नाही. आता त्यामागे अनेक कारणे आहेत. सगळ्यात महत्त्वाचे कारण म्हणजे स्थानिकांमध्ये जनजागृती. स्थानिकांना त्याबाबत माहिती आहे; परंतु त्याचा वापर पर्यटनवाढीसाठी कसा करावा ह्याची योग्य जाण अजून कोकणातल्या स्थानिकांना नाही.

भारतीय उपखंडात बाहेरच्या देशांतील येणार्‍या पर्यटकांचे मूळ आकर्षणबिंदू हे दोन आहेत. एक म्हणजे नैसर्गिक आणि दुसरं म्हणजे सांस्कृतिक आणि ऐतिहासिक. नशिबाने कोकण किनारपट्टीला ह्या दोन्ही संसाधनांचा उत्तम वरदहस्त लाभलेला आहे. नैसर्गिक समुद्रकिनारे, धबधबे, फुलं वगैरे गोष्टी तर आहेतच; पण सोबतीने गणेशोत्सव, शिमगा, नवरात्री, दिवाळी ह्या सणवार आणि उत्सवांचीसुद्धा मोठ्या प्रमाणावर रेलचेल असते. सोबतच नृत्य, नाट्य ह्यांच्या संगमाने युक्त असे अनेक नृत्यनाट्याविष्कार जसे की नमन, जाखडी, दशावतार वगैरे सांस्कृतिक बाबी अजून तरी कोकणात जपून ठेवण्यात स्थानिक लोक यशस्वी झालेले दिसून येतात. कोकणातला हा अमूर्त वारसा दशावतार, नमन आणि गणेशोत्सवाच्या माध्यमांतून जगभरात पोहोचला; पण कोकणातल्या मूर्त वारशाचे काय? मुळात आधी वारसा म्हणजे काय ते आपण जाणून घ्यायला हवे. थोडक्यात सांगायचे झाल्यास वारसा म्हणजे आपल्या पूर्वजांनी निर्माण केलेल्या मूर्त आणि अमूर्त संकल्पना, गोष्टी. ह्यामध्ये अगदी छोट्याशा कागदापासून एखादा मोठा सणवार, उत्सव तसेच पाषाणात कोरलेल्या मूर्तीसुद्धा येतात. हा मिळालेला वारसा जपावा, त्यात आपल्या परीने भर घालावी आणि तो पुढच्या पिढीच्या हाती सोपवावा हे सामान्यपणे पिढ्यान्पिढ्या चालत आलेले असते. एखादी वास्तू वारसा म्हणून सांगताना त्या वास्तूमुळे त्या भौगोलिक भागावर पडलेला प्रभाव, त्या वास्तूचे राजकीय किंवा सामाजिक स्थान, या गोष्टींचा विचार केला जातो. त्याशिवाय ती त्या त्या काळातील विचारशैलीचे; धार्मिक, सामाजिक अभिसरणाचे, समृद्धीचे, विचारप्रवाहांचे प्रतिनिधित्व करतात. अशा प्रकारचा विविध कालखंडांतील वारसा कोकणात मूर्त आणि अमूर्त दोन्ही प्रकाराने दिसून येतो.

अमूर्त वारसा तर आपण पाहिलाच. आता मूर्त वारसा पाहताना कोकण किनारपट्टी ही फार पूर्वीपासून व्यापाराचे एक महत्त्वाचे केंद्रस्थान म्हणून गणली गेलेली आहे. पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा भागांतील अनेक ऐतिहासिक शहरे, त्यात तयार होणार्‍या वस्तू ह्यांचा व्यापार हा कोकण किनारपट्टीवरून विविध देशांत केला जात असे. ह्या काळात व्यापार्‍यांना राहण्यासाठी म्हणून तयार केलेल्या अनेक लेण्या कोकणात कोरलेल्या दिसतात. ह्या लेण्या कोण्या एका धर्माशी किंवा कोण्या एका राजघराण्याशी संबंधित नसून विविध कालखंडांत विविध राज्यांनी विविध धर्म आणि संस्कृतींच्या उद्धारासाठी ह्या बांधलेल्या दिसतात. मुंबईत असणार्‍या कान्हेरी लेण्या, एलिफंटा लेणी, रायगड जिल्ह्यातील कुडा,रत्नागिरीमधील पन्हाळेकाजी, खेडच्या लेण्या, लांजा येथील कातळगांव, सोबतच सिंधुदुर्गात असलेले विमलेश्वर इत्यादी लेण्या ह्या वारसा पर्यटनासाठी अत्यंत महत्त्वाच्या अशा आहेत. हल्लीच राजापूर तालुक्यात अनेक ठिकाणी जांभा दगडातील एकाश्म मंदिरेसुद्धा समोर येत आहेत. लेण्यांबरोबरच अनेक जुनी काळ्या पाषाणात विविध राजवटींत बांधलेली मंदिरे कोकणात दिसून येतात, त्यामध्ये कसबा संगमेश्वर आहे, कुणकेश्वर आहे, कनकादित्य मंदिर आहे, तसेच मराठाकालीन उतरत्या छपराची जवळपास 1000 छोटीमोठी मंदिरे कोकणात विविध ठिकाणी दिसून येतात.मराठाकालीन मंदिरांच्या बरोबरीने त्याच काळातील अनेक गड आणि किल्ले कोकणात दिसतात. त्यात अगदी प्रबळगडासारखा वनदुर्गपण आहे आणि मुरुड जंजिरा, सुवर्णदुर्ग, सिंधुदुर्गसारखेसमुद्री किल्लेसुद्धा आहेत. ह्या प्रकारचा ऐतिहासिक, सांस्कृतिक वारसा हा पर्यटनाला चालना देण्यासाठी पुष्कळ आहे; परंतु ह्याच्यापल्याड जाऊन अगदी अश्मयुगीन म्हणावा असा वारसा गेल्या काही वर्षांत कोकणात समोर येताना दिसतो आहे, तो म्हणजे कातळखोद चित्र (कातळशिल्प) रूपाने.

गेल्या दहाएक वर्षांत अश्मयुगीन मानवाने त्याच्या भावभावनांचा मांडलेला एक मोठा पट जो कातळखोद चित्रांच्या रूपाने आता जगासमोर आणला जात आहे. मी आणि माझे सहकारी गेली काही वर्षे ह्या चित्रांवर अभ्यास करतो आहोत. रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांत 110 गावांमध्ये 150 ठिकाणी 2000 हून अधिक चित्रे आढळून आली आहेत. ही चित्रे कोकणातल्या सड्यावर म्हणजेच आडव्या पसरलेल्या जांभ्या दगडाच्या पठारावर कोरलेली आहेत.

Katal Shilp Konkan

हा आडवा पसरलेला जांभा दगडाचा सडा गेली अनेक वर्षे अनेक गुपिते आपल्या पोटात ठेवून आहे. त्यातलाच एक भाग म्हणजे ही कातळखोेद चित्रे. 2012 साली आडवळणावरच कोकण ह्या संकल्पनेतून चालू झालेला आडवळणावरचा प्रवास आज युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळ होण्याच्या दिशेने निघालेला आहे. आता नक्की ही कातळखोद शिल्पे म्हणजे काय? तर हा प्रागैतिहासिक मानवाच्या कलेचा एक भाग आहे. प्रागैतिहासिक भित्तिचित्र ह्या प्रकारात तीन महत्त्वाचे भाग आहेत.

पिक्टोग्राफ- चित्ररंगांचा वापर करून

पेट्रोग्लीफ- दगडावर कोरणे

जिओग्लीफ/अर्थ फिगर- आडव्या जमिनीवर कोरणे

आता ह्या तीन भागांपैकी तिसरा भाग हा कोकणात जांभ्या दगडाच्या सड्यावर आढळून येतो. 2000 हून अधिक चित्रांची नोंद करताना अनेक संदर्भांचा मागोवा घेत राहिलो होतो. त्यानंतर मग ह्या एवढ्या चित्रांची त्यांच्या आकारानुसार विभागणी केली. तेव्हा आढळून आले की, ह्यामध्ये मानवी आकृती आहे, भौगोलिक आकृत्या आहेत तसेच सोबतीने अनेक प्राणी आणि पक्ष्यांचेसुद्धा अंकन केलेले आहे आणि सगळ्यात महत्त्वाची बाब म्हणजे ह्यामध्ये जे काही प्राणी कोरले आहेत ते एक तर आकाराने जेवढे असतात तेवढे आहेत किंवा त्याहून जास्त मोठे दाखवले गेले आहेत. आता ह्यामध्ये एकशिंगी गेंडा, हत्ती, हरिण वर्गातील प्राणी, विविध पक्षी, जलचर, उभयचर असे विविध प्रकार दिसून येतात. ह्या चित्रांसोबतच त्या काळी मानवाने शिकार करण्यासाठी बनवलेली हत्यारेसुद्धा आढळून येत आहेत. ह्याच्या कालखंडाबाबत जरी आता काही निश्चित माहिती हातात नसली तरी समोर येणारे पुरावे हेच सांगतात की, ही चित्रे कोकणात राहणार्‍या अश्मयुगीन माणसाने कोरलेली असावीत. ह्यातीलच नऊ साइट्स आता जागतिक वारसा म्हणून युनेस्कोच्या प्रस्तावित यादीत नोंदवल्या गेल्या आहेत. त्यातील सात ह्या रत्नागिरी जिल्ह्यातील आहेत. एक सिंधुदुर्गातील आणि एक गोव्यातील आहे.

आता युनेस्कोसारख्या संस्थेनेसुद्धा ज्यांची दखल घेतली त्या कातळखोद चित्रांत एवढे काय वेगळेपण आहे? किंवा त्यांचे पुरातत्त्वीयदृष्ट्या महत्त्व काय? ते आपण जाणून घेऊ. कोणत्याही ठिकाणी पुरातत्त्वीय अभ्यास करताना विविध गोष्टी विचारात घेऊन तो अभ्यास करायला लागतो. आधीच सांगितल्याप्रमाणे मंदिरे, एकाश्म मंदिरे ह्यांची बांधणी कधी केली गेली, कोणी केली वगैरे बर्‍यापैकी बाबी लिखित स्वरूपात उपलब्ध असतात; पण जेव्हा एखादा पुरातत्त्वज्ञ त्याच्यापल्याड जाऊन अजून जुन्या गोष्टींचा अभ्यास करतो तेव्हा त्याबाबतचे पुरावे त्या भागात सापडणे गरजेचे असते. हे पुरावे सापडणे हे पुन्हा एकदा त्या भागाच्या पर्यावरणीय आणि वातावरणातील बदलांवर अवलंबून असते. भारतातील सगळ्यात जुने पुरावे हे राजस्थानमध्ये सापडतात, कारण तेथील वातावरण लाखो वर्षे जुन्या पुराव्यांना शाबूत ठेवण्यासाठी योग्य म्हणजेच शुष्क, कोरडे आहे. कोकणात ह्याच्या आत्यंतिक विरुद्ध परिस्थिती आहे. प्रचंड प्रमाणात पाऊस आणि उष्ण कटिबंधीय भाग. कोकणात पुरातत्त्वीय अभ्यास न होण्याचे हे एक खूप महत्त्वाचे कारण आहे. कोकणातील कातळखोद चित्रे एवढ्या प्रतिकूल वातावरणात राहिली कशी, ह्याचेही उत्तर त्या जांभ्या खडकात आहे. जांभा दगडाला सच्छिद्रता असल्या कारणाने नैसर्गिक झीज अत्यंत कमी आहे म्हणूनच एवढी हजारो वर्षे ही चित्रे टिकून राहिली असावीत. वर लिहिल्याप्रमाणे चित्रांसोबत आम्हाला काही दगडी हत्यारेसुद्धा सापडली. त्याचा शोध मात्र फारच कठीण होता; पण त्याने एक गोष्ट नक्की केली, की इसवीसनपूर्व 20,000-5000 ह्या कालखंडातमानवाचे कोकणातल्या सड्यावर वास्तव्य नक्की होते; पण माणसाला जगायला ज्या प्रकारचे वातावरण लागते, तसे वातावरण तेव्हा होते का? कसा जगला माणूस आणि सोबतच ही चित्रांमधून दिसणारी जीवसृष्टीसुद्धा? ह्या सगळ्यांची उत्तरे कातळखोद चित्रांमधून आपल्याला मिळतात आणि हेच ह्या कातळखोद चित्रांचे वैशिष्ट्य आहे जे जगाला आता दिसून येते आहे.

Katal Shilp Konkan 

कोकणात आतापर्यंत आम्हाला 2500 च्या सुमारास चित्रे आढळून आली आहेत, त्यामध्ये विविध प्रकार आढळून आलेले आहेत. जसे की मानवाकृती, भौमितिक आकृत्या आणि वर उल्लेख केल्याप्रमाणे अनेक प्रकारचे प्राणी आणि पक्षी. काही पुराजीव अभ्यासकांच्या आणि चित्रकार कलाकार लोकांच्या म्हणण्यानुसार ही काढलेली चित्रे ही first hand drawing ह्या सदरात मोडणारी अशी आहेत, मेमरी drawing नव्हेत. म्हणजेच माणूस कुठे तरी एखादा प्राणी बघून आला आणि मग आठवून आठवून त्याचे चित्र काढले, अशी ही चित्रे नव्हेत. जे काही प्राणी, पक्षी तो माणूस दररोजच्या व्यवहारात पहात होता, अनुभवत होता, ते प्राणी त्याने अत्यंत बारीक बारकाव्यानिशी कोरलेले दिसतात. येथे हत्ती दिसतो. साधारणपणे बाराएक ठिकाणी हत्तीचे अंकन आहे. विविध आकार पाहता ते विविध वयांतील असावेत असे वाटते. सद्यःस्थितीत हत्ती कोकणात अस्तित्वात नाही. हा आदि दक्षिणेकडे सिंधुदुर्ग गोवा आणि कोल्हापूर बॉर्डरवर दोडामार्ग वगैरे भागांत दिसतात तेवढेच. रत्नागिरीत तर नक्कीच नाहीयेत. अशीच बाब एकशिंगी गेंड्याच्या बाबतीत. एकशिंगी गेंडा जो आता फक्त आसाममध्ये दिसून येतो, त्याच्या आतापर्यंत सहा आकृत्या रत्नागिरी जिल्ह्यात आढळून आलेल्या आहेत. साधारणपणे इसवीसनपूर्व 2000 पर्यंत गुजरात, मध्य प्रदेश आणि उत्तर महाराष्ट्र भागात गेंड्याचे अस्तित्व होते असे पुरावे विविध रूपांत आढळले आहेत; पण कोकणात गेंडा राहत होता ह्याचा पुरावा हा ह्या कातळखोद चित्रांच्या रूपाने समोर आला आहे. ह्या दोन महत्त्वाच्या प्राणांच्या आकृतीसोबतच एक आकृती मात्र अत्यंत कोड्यात टाकणारी आहे ती म्हणजे कशेळी येथे सापडलेली पाणघोडासदृश आकृती. काही पुराजीव अभ्यासकांच्या मते ते 12 फूट लांब आणि 5 फूट उंचीचे चित्र हे पाणघोड्याचे असावे. आता पाणघोड्याच्या अस्तित्वाचा शेवटचा म्हणजेच उशिरात उशिराचा पुरावा हा लातूरमधल्या मांजरा नदीच्या खोर्‍यात करण्यात आलेल्या उत्खननातून मिळतो. तेथे पाणघोड्यासोबत गेंडा, मगर वगैरे इतर प्राण्यांचेसुद्धा जीवाश्म सापडले आहेत ज्याचा कालखंड साधारणपणे 25-40000 वर्षे एवढा मागे जातो. महाराष्ट्राच्या दक्षिणेला गेंड्याचे पुरातत्त्वीय पुरावे नाही सापडलेत. फक्त बेळगावला 1860 मध्येे रॉबर्त ब्रूस फूट ह्या भूगर्भ अभ्यासकाला गेंड्याचे जीवाष्म सापडल्याचे उल्लेख आहे. आता तसे पाहायला गेले तर मग कोकणात सापडलेली ही गेंडा, पाणघोडा ह्यांची चित्रेसुद्धा एवढीच जुनी आहेत का?

कोकणात ही चित्रे सापडली आहेत हे खरे. अगदी ती चित्रे ज्याने कोरली आहेत, जशी कोरली आहेत, त्यावरून वाटते की, ह्या प्राण्यांच्या सहवासात तो कलाकार असावा; पण ह्याच्या पल्याड पुरातत्त्वीयदृष्ट्या प्राथमिक म्हणता येतील असे पुरावे कोकणात अजून आढळलेले नाहीत. आता प्राथमिक पुरावे म्हणजे काय? तर ह्या चित्रांमध्ये असलेल्या प्राण्यांचे जीवाश्म किंवा उत्खननात त्यांची हाडे सापडणे जशी त्या मांजरा नदीच्या किनारी सापडली आहेत. तशा प्रकारचा पुरावा कोकणात सापडणे हे जवळपास अशक्य आहे. त्याचे कारण एकतर कोकण किनारपट्टीचे वातावरण आणि हा जांभा दगड हाच आहे. जरी प्राथमिक पुरावा नसला तरी ह्याच वातावरणाचा अभ्यास करून अन्य काही पुरावे समोर आले आहेत. अन्य पुरावे म्हणजे पुरा पर्यावरणाचा अभ्यास.

गेंडा, पाणघोडा, हत्ती, इतर हरीण वर्गातील प्राणी ह्यांची चित्रे आपल्याला कोकणात दिसतात म्हणजेच ते प्राणी कधी ना कधी तरी कोकणात अस्तित्वात होते. त्यांच्या अस्तित्वासाठी लागणारे वातावरण कसे असते? ते तेव्हा होते का? कसे होते? ह्या अभ्यासावर आमचा आता भर आहे. साधारणपणे ह्या मोठ्या प्राण्यांना आवडणारे वातावरण म्हणजे सदाहरित गवताळ भाग हवा असतो जिथे मुबलक प्रमाणात पाण्याचे साठे आहेत आणि तेही छोट्या छोट्या आकाराचे असे. आता सद्यःस्थितीला आपण कोकणात पाहायला गेलो तर हे असे वातावरण दिसत नाही. जेवढा पाऊस इथे पावसाळ्यात पडतो तेवढाच उकाडा हा उन्हाळ्यात असतो; परंतु तेव्हा म्हणजेच जेव्हा हे प्राणी अस्तित्वात होते तेव्हा असे वातावरण नसावे असे वाटते. आता पुरातत्त्वाचा अभ्यास करताना प्राचीन पर्यावरणाची पुनर्बांधणी हा एक फार महत्त्वाचा भाग असतो. त्याचा वापर आम्ही इथे करतो आहोत. 2012 च्या आसपास पुण्यातील आगरकर संस्थेतल्या काही अभ्यासकांना कांगवाई ह्या दापोली तालुक्यातील गावात एका विहिरीचे खोदकाम चालू असताना एका पानाचे जीवाष्म आढळून आले. जीवाश्म ह्यांचा कालखंड विविध तांत्रिक पद्धतीने काढता येतो. त्याचा कालखंड के. पी. कुमारन, शरद राजगुरू ह्या अभ्यासकांनी साधारणपणे 44000 वर्षे ते 20000 वर्षे एवढा जुना काढला. त्यांच्या म्हणण्यानुसार ज्या पानाचे हे जीवाष्म आहे ते पान किंवा ती वनस्पती साधारणपणे अशा ठिकाणी सापडते जेथे तलाव किंवा छोट्या छोट्या आकारांचे पाणीसाठे आहेत. आता ह्याच प्रकारचे वातावरण आपल्या हत्ती आणि गेंडा यांसारख्या मोठ्या जीवांच्या आवडीचे आहे. सोबतच मघाशी वर सांगितल्याप्रमाणे आम्हाला जी काही दगडी हत्यारे मिळाली आहेत तीसुद्धा ह्याच कालखंडाशी मिळत्याजुळत्या कालखंडातील आहेत. तदनंंतर मात्र वातावरणात अनेक बदल झाले असावेत असे वाटते. नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ ओशनोग्राफी, गोवा ह्यांचे माजी संचालक राजीव निगम ह्यांनी नंतर समुद्राच्या पाण्याच्या पातळीचा अभ्यास केला आणि अंदाज बांधला की, आताची समुद्राची पातळी ही साधारणपणे इसवीसनपूर्व 2000 च्या आसपास स्थिरावली आहे. तत्पूर्वी ती सतत कमीजास्त होत होती. ज्या कालखंडाचा आपण विचार करतो आहोत त्या कालखंडात समुद्राची पातळी खूप मागे म्हणजेच आत असावी. त्यामुळे माणसाला आणि प्राण्यांना वावरायला जागासुद्धा मुबलक प्रमाणात उपलब्ध असावी. त्यानंतर समुद्राच्या पाण्यात झालेली वाढ मात्र त्या वेळचे अनेक पुरावे आपल्यासोबत खोल समुद्रात घेऊन गेली आहे. सिंधुदुर्गात मालवण भागात पुन्हा एकदा आगरकर संस्थेच्या कुमारन सरांना अशाच काहीखारफुटी वनस्पतीवर लागणार्‍या बुरशीचे जीवाश्म मिळाले आहेत अशा ठिकाणी जिथे आता खारफुटीची झाडे दिसत नाहीत. ह्याचा अर्थ समुद्र बर्‍यापैकी आत गेला आहे. त्याचा कालखंड हा साधारणपणे इसवीसनपूर्व 12000-10000 आहे. ह्याचे कालखंडाशी समांतर जाणारे पुरावे जळगाव तालुक्यातील पटणे गावातून येतात. प्रा. साळी ह्यांना तेथे उत्खननात शहामृगाच्या अंड्यांचे तुकडे आढळून आले. आता शहामृगसुद्धा कोणे एके काळी महाराष्ट्रात होते आणि त्याला लागणारे पर्यावरण मात्र गेंडा आणि हत्ती ह्यांच्यापेक्षा पूर्ण वेगळे असते. तसाच काहीसा प्रकार इकडे एका चित्रात दिसून येणार्‍या एलीफंट बर्ड ह्या पक्ष्याचा. हा पक्षी जगातून नाहीसा होऊन 5000 वर्षे उलटली. मादागास्कर आणि आजूबाजूच्या परिसरांत सापडणारा हा उडता न येणारा पक्षी गवताळ प्रदेशात रमणारा. शहामृगापेक्षा जवळपास दोनेएक फूट उंच आणि पायात प्रचंड ताकद असणारा हा पक्षी भारतात होता ह्याचे पुरावे अजून सापडले नाहीयेत; पण कोकणात एक आकृती आहे जी 13 फूट उंच आहे आणि ह्या एलीफंट बर्डच्या शारीरिक रचनेशी मेळ खाणारी अशी आहे.

Katal Shilp Konkan 

कोकणात सड्यावर फिरताना नैसर्गिकरीत्या तयार झालेली अनेक छोटीमोठी तळी आता आम्ही अभ्यासत आहोत. त्यात काही जुन्या मातीचे किंवा वनस्पतीजन्य जीवांचे किंवा पानांचे अवशेषमिळतात का ह्याचा शोध घेणे चालू आहे; परंतु हा एवढा मोठा विषय अभ्यासायचा म्हणजे काही सोप्पे काम नव्हे. गोष्टी शोधायच्या, गोळा करायच्या, मग त्याचा अभ्यास करून निष्कर्ष काढायचा, ही खूप लांबलचक, मोठी आणि थकवणारी प्रोसेस आहे. सोबतच कातळचित्रांची संख्या दिवसेंदिवस वाढते आहे. प्रत्येक नवीन साइटवरून नवीन माहिती समोर येते आहे. कर्नाटक,केरळमधूनसुद्धा आता चित्रे समोर येत आहेत. तिथे मात्र कुठेही गेंडा किंवा हत्ती ह्यांचे चित्रण दिसत नाही. त्यामुळे वातावरणातले बदल हे फक्त महाराष्ट्रातील कोकण किनारपट्टीपुरते मर्यादित होते, की पूर्ण पश्चिम किनारपट्टी त्यातून गेली होती ह्यावर अभ्यास चालू आहे. प्राचीन काळात माणूस हा नैसर्गिक बदलांसाठीचा मूलस्रोत नव्हता. निसर्गात नैसर्गिक पद्धतीने होणारे बदल हे सावकाश होत असत आणि त्याच वेगाने तो माणूस ते बदल आत्मसात करून त्यानुसार आपली जीवनशैली आखत होता. त्यामुळे संतुलन व्यवस्थित राखले जात होते. नंतरच्या कालखंडात माणसाने प्रगती केली आणि निसर्गाच्या विरोधात जाऊन त्याला ओरबाडायला सुरुवात केली. होणारे बदल स्वीकार करायलासुद्धा माणसाला वेळ मिळेनासा झाला आहे. नैसर्गिक संसाधनांचा अयोग्य वापर करून माणूस आपली प्रगती साधत आहे जी पर्यावरणासाठी अत्यंत धोकादायक आहे. पुरातत्त्वाचा अभ्यास करताना अशा अनेक गोष्टी समोर येतात आणि भूतकाळ आपल्याला काय काय देऊन गेला आहे ह्याची जाणीव होते, सोबतच आपण आता वर्तमानातून काय काय हरवून बसत आहोत आणि भविष्यात काय काय दवडणार आहोत ह्याची जाणीव करून देतो. शेवटी आपण जे काही करतो ते आपल्या भविष्यासाठी; पण तेच जर आता आपण चुकीच्या पद्धतीने करत असू तर त्यावर वेळीच निर्बंध घालायला हवेत एवढे नक्की.

etvbharat.com
सिंधुदुर्गात नव्याने सापडले कातळशिल्प; अश्मयुगीन पाऊल खुणा
ETV Bharat
3–4 minutes
सिंधुदुर्गात नव्याने सापडले कातळशिल्प; अश्मयुगीन पाऊल खुणा - कोकणातील कातळशिल्पांचे महत्त्व
सिंधुदुर्ग - जिल्ह्यात कातळशिल्पाच्या माध्यमातून अश्मयुगीन पाऊल खुनांचा ठोस पुरावा आढळू लागला आहे. मालवणनंतर आता देवगड तालुक्यातील साळशी गावच्या माळावर कातळशिल्प आढळून आले आहे. ऐतिहासिक वारसा असलेल्या साळशी गावच्या महत्त्वामध्ये त्यामुळे आणखीनच भर पडली आहे.

सिंधुदुर्गात नव्याने सापडले कातळशिल्प

प्रागैतिहासिक काळातील सांस्कृतिक संदर्भ म्हणून कातळशिल्पांचे महत्त्व आहे. आदिमानवाने विविध शिल्पे दगडात कोरून ठेवलेली आहेत. ती कशाची चित्रे आहेत, त्यातून काय व्यक्त होते हे सांगणे अवघड आहे. विविध प्राणी, पक्षी अथवा काही अगम्य नक्षीकाम अशी ती खोदचित्रे गूढ आहेत. जगभरात अशा प्रकारच्या शिल्प किंवा चित्रांना राॅक आर्ट किंवा पेट्रोग्लिफ्स या नावाने ओळखले जाते. मुख्यत्वे लेण्यांच्या भिंतींवर केलेले कोरीव काम सर्वत्र आढळते; परंतु संपूर्णपणे उघड्यावर असलेल्या कातळावरील ही खोदचित्रे महाराष्ट्रात विशेषेकरून कोकणातच पाहण्यास मिळतात. कोकण भागात विशेषतः रत्नागिरी जिल्ह्यातील रत्नागिरी, लांजा, राजापूर तसेच देवगड आणि सिंधुदुर्ग तालुक्यातील ५० गावांमध्ये अशी शिल्पे आहेत.

पावणाई देवीचे मंदिर ८३ खेड्यांचे अधिपती असलेले देवस्थान

साळशी गावाला ऐतिहासिक महत्व आहे. हे गाव आदिलशाहीपासून तालुक्याचे ठिकाण म्हणून ओळखले जात होते. स्वराज्यात सामील झाल्यानंतर या गावाचा दबदबा आणखीनच वाढला. याठिकाणचे पावणाई देवीचे मंदिर हे ८३ खेड्यांचे अधिपती असलेले देवस्थान म्हणून ओळखले जाते. मंदिराची भव्यदिव्यता इतिहासाच्या पार्श्वभूमीची साक्ष देतात. याशिवाय अनेक अशा ऐतिहासिक पाऊलखुणा या भागात सापडतात.

कोळोशी गावात काही वर्षांपूर्वी एक गुहा सापडली

याच साळशीच्या माळावर आता आदिमानवाच्या पाऊल खुणांची साक्ष देणारे कातळशिल्प सापडले आहे. विशेष म्हणजे साळशीला लागून असलेल्या कोळोशी गावात काही वर्षांपूर्वी एक गुहा सापडली. या गुहेबाबत संशोधन झाले. या ठिकाणी आदिमानवाची वस्ती असल्याचे या संशोधनातून समोर आले आहे. त्यामुळे साळशीत सापडलेल्या या कातळशिल्पामुळे येथील संशोधनाला नवा दुवा मिळाला आहे. विशेष म्हणजे याच शिल्पाच्या बाजूला काही अंतरावर भलीमोठी कातळात कोरलेली गुहादेखील आहे. अनेकवेळा जनावर पडून मृत झाल्याने स्थानिक गुराख्यांनी माती दगड टाकून काही प्रमाणात ही गुहा बुजवली आहे.

हा अश्मयुगीन ठेवा असू शकतो

यावेळी बोलताना येथील तरुण निसर्गप्रेमी अभ्यासक संतोष गावकर म्हणाले कि, या कातळशिल्पाच्या बाबतीत आम्ही तज्ञ मार्गदर्शकांशी संपर्क साधला आहे. या शिल्पाचा अभ्यास सुरू असून लवकरच आम्ही याबाबतीत ठोस माहिती लोकांसमोर आणू. तर स्थानिक नागरिक असलेले प्रणव नाडनकर म्हणाले, आमच्याकडे जैन संस्कृतीच्या पाऊल खुणाही सापडतात. आमच्याकडे हा अश्मयुगीन ठेवा असू शकतो, असे वाटत होते. कारण अन्य भागात कातळशिल्प सापडत असताना आपल्याकडेही ती असतील असा आमचा अंदाज होता. आता हे कातळशिल्प सापडल्याने या भागातील नवा ठेवा समोर आला आहे. कोकणाचा उल्लेख पुराणातही सापडतो. सप्तपाताळातील कोकण हे एक पातळ म्हणून ओळखले जाते. या पाताळात आणखीन काय-काय दडले आहे, ते या शिल्पांच्या संशोधनातून समोर येऊ शकते.

marathisrushti.com
कोकणातील कातळशिल्पे – Marathisrushti Articles
11–14 minutes



मार्च 2022 मध्ये युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळांच्या तात्पुरत्या यादीमध्ये कोकणातल्या रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील अनुक्रमे 5 आणि एक आणि गोव्यातील एक ठिकाण अशा एकूण 7 कातळ खोदशिल्पे असलेल्या गावांचा समावेश करण्यात आला. कोकणाला खूप मोठा सांस्कृतिक ऐतिहासिक वारसा लाभला आहे. ह्या कातळ खोद चित्रांच्या रूपाने तो पुढे येत आहे.

महाराष्ट्राच्या पश्चिम दिशेला असणारा अरबी समुद्र आणि पूर्वेकडचा सह्याद्री पर्वत ह्या दोघांच्या मध्ये असणारा भाग हा कोंकण म्हणून ओळखला जातो. हीच महाराष्ट्रातील कोंकण किनारपट्टी ही निसर्गसंपन्न आणि सांस्कृतिक आणि खाद्यासंस्कृतीने संपन्न अशी आहे. एकूण 720 किलोमीटर लांबीचा समुद्रकिनारा महाराष्ट्राला लाभलेला आहे. ह्या भागात असणारे नितळ समुद्र किनारे, जंगलं, मंदिरे आणि इतर अनेक गोष्टींसोबतच ह्या भागाचा इतिहास सुद्धा तेवढाच महत्त्वाचा आहे. ऐतिहासिक कालखंडाबाबतचे विविध पुरावे आपल्याकडे शिवाजी महाराजांच्या काळात आणि त्याच्या आधी बांधले गेलेले अनेक किल्ले जसे की सिंधुदुर्ग, मुरुड-जंजिरा, सुवर्णदुर्ग, पूर्णगड इत्यादी आणि त्याच्याही आधी बांधल्या गेलेल्या विविध लेणी ज्या साधारणपणे इसवी सनाच्या तिसऱ्या ते 7-8 व्या शतकापर्यंत अशा स्वरूपात दिसतात. परंतु त्याच्या आधीच्या कालखंडाचे कोणतेच पुरावे मोठ्या प्रमाणावर समोर आले नव्हते. पुरातत्त्वीय भाषेत त्याला dark age असे म्हणतात.

भौगोलिकदृष्ट्या जरी हा प्रदेश एक सारखा दिसत असला तरी भूशास्त्रीय जडणघडणीनुसार या भागाचे अजून 3-4 विभाग करता येतात. उत्तर कोकणातील ठाणे, रायगड जिल्हा ह्या भागाचा भूप्रदेश मुख्यतः बेसाल्ट दगडाचा म्हणजेच काळ्या पाषाणाचा आहे आणि दक्षिण कोकणातील म्हणजेच रत्नागिरी, सिंधुदुर्ग ह्या जिल्ह्यांमधील भूप्रदेश हा मुख्यत्वे जांभ्या दगडाचा असून त्याचा विस्तार अगदी महाराष्ट्राच्या दक्षिणेकडे गोवा, कारवार करत केरळपर्यंत दिसतो. कोकणाची ओळख असलेला जांभा दगड प्रामुख्याने दक्षिण कोकणात किनाऱ्या जवळच्या पठारांच्या माथ्यावर आढळून येतो. ह्या जांभ्या दगडाच्या कमी उंचीच्या पठारांना स्थानिक भाषेत ‘सडा’ असे म्हणतात. तर ही सगळी प्रस्तावना द्यायचे मूळ कारण म्हणजे हा जांभा दगड ज्याला भूगर्भीय भाषेत laterite असे म्हणतात तो गेली अनेक वर्ष पुरातत्त्वीयदृष्ट्या महत्त्वाची अशी अश्मयुगीन अनेक रहस्य दडवून बसला आहे.

अश्मयुगात शिकार करून पोट भरणारा माणूस हळूहळू एके ठिकाणी राहून साधारणपणे आतापासून 12,000 वर्षांपूर्वी  स्थिर जीवन जगू लागला होता. शिकार करण्यासाठी त्याच्याकडे असणारी दगडी हत्यारे आता जास्त विकसित झाल्यामुळे शिकार करण्यासाठी त्याला लागणारा वेळ खूप कमी झाला होता त्या उरलेल्या वेळेचा वापर त्याने व्यक्त होण्यासाठी केला म्हणजेच त्याच्या आयुष्यात घडणाऱ्या घटना, तो बघत असलेले प्राणी, त्याचं स्वतःच जीवन याबाबतच्या गोष्टी तो चित्र रूपात दगडी भिंतींवर अथवा जमिनीवर कोरून किंवा रंगवून काढू लागला होता. ह्या कलेच्या प्रकाराला पुरातत्वशास्त्राच्या भाषेत Rock art किंवा भित्ती चित्र/ खोदचित्र असे म्हटले जाते. रंगवलेल्या चित्रांना pictogtraph आणि खरवडून काढलेल्या चित्रांना petroglyph असे म्हटले जाते. कलेच्या इतिहासातील हा एक महत्त्वाचा टप्पा गणला जातो. ही अशा प्रकारची चित्र जगभरात अंटार्क्टिका खंड सोडल्यास सगळीकडे सापडतात.

गेल्या काही वर्षात कोकणात अशा प्रकारच्या जमिनीवर निर्माण केलेल्या गूढ आणि अगम्य अशा खोदचित्ररचना हजारोंच्या संख्येने आढळून येत आहेत स्थानिक भाषेत त्याला ‘कातळ खोदशिल्प’ असे म्हटले जाते. मानवी उत्क्रांतीच्या एका विशिष्ट टप्प्यातील कालखंडावर प्रकाश टाकणाऱ्या अत्यंत बहुमोल अशा या खोदचित्र रचनांमध्ये लहान आकारच्या खळग्यापासून अगदी चौकोन त्रिकोण आणि अनेक गूढ अगम्य अशा प्राण्यांच्या पक्ष्यांच्या चित्ररचनांचा समावेश होतो. परंतु कोकणातल्या चित्रांचे वैशिष्ट्य म्हणजे ती आकाराने प्रचंड मोठी आहेत, आणि आता पर्यंत हाती आलेल्या माहितीनुसार रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात, जवळपास 350 किलोमीटर एवढ्या प्रदेशात, विविध ठिकाणी पसरलेली आहेत. ह्या चित्रांमध्ये एक शिंगी गेंडा, हत्ती, वाघ, पाणघोडा, सोबतच अनेक पक्ष्यांची चित्रेसुद्धा कोरून ठेवली आहेत जे आता कोकणात अस्तित्वात नाहीत. ह्या चित्रांचा कालखंड सांगणे फारच अवघड आहे त्याच्या दृष्टीने सुद्धा संशोधन चालू आहे. गेल्या शतकात साधारणपणे 1990 च्या आसपास रत्नागिरी गणपतीपुळे ह्या रस्त्याच्या रुंदीकरण कामाच्या वेळी पहिल्यांदा एक चित्ररचना लोकांच्या नजरे समोर आली, त्यानंतर पुण्यातील डेक्कन महाविद्यालयातील अभ्यासक डॉ. श्रीकांत प्रधान, प्रा. गोगटे आणि डॉ. प्रबोध शिरवळकर ह्यांनी काही नवीन ठिकाणे शोधून काढली आणि तो अभ्यास जगासमोर मांडला. डॉ. अनिता राणे, डॉ. दाउद दळवी, प्रा. प्र .के. घाणेकर, डॉ. रवींद्र लाड तसेच सिंधुदुर्ग जिल्ह्यातील निवासी असणारे श्री. सतीश लळीत ह्यांनी काही नवीन ठिकाणी संशोधन केले. कातळ शिल्पांचा शोध आणि संरक्षणाबाबत महत्त्वाचे काम केले ते म्हणजे रत्नागिरी येथे असलेल्या ‘निसर्गयात्री संस्थे‘च्या सदस्यांनी म्हणजेच सुधीर रिसबूड, धनंजय मराठे आणि प्रा. सुरेंद्र ठाकूरदेसाई ह्या त्रयीने. 2014 सालापासून ह्यांनी कातळशिल्पांच्या शोधाबरोबर त्याचे पुरातत्वीय महत्त्व स्थानिक लोकात पटवून दिले आणि संरक्षणाचे काम ही हाती घेतले. 2017 सालापासून ह्या अगम्य ठेव्याला कायदेशीर संरक्षण मिळावे म्हणून पुरातत्त्व आणि वस्तुसंग्रहालय, महाराष्ट्र शासनसुद्धा कामी लागले आहे. निसर्गयात्री संस्था, रत्नागिरी आणि महाराष्ट्र शासन आता एकत्रित ह्या गूढ आणि अगम्य विषयावर संशोधनात्मक आणि संरक्षणाचे काम करीत आहेत. ह्या उत्साही अभ्यासकांनी विभागाच्या सोबतीत आतापर्यंत रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात 72 गावात 102 ठिकाणी जवळपास 1500 हून जास्त शिल्परचना शोधून काढल्या आहेत ही सर्व कातळशिल्प महत्त्वाची असून त्याची महसूलविषयक कागदपत्रांची पूर्तता करून ती राज्य संरक्षित स्मारके म्हणून घोषित करावीत यासाठीचे प्रयत्न चालू आहेत.

मार्च 2022 मध्ये युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळांच्या तात्पुरत्या यादीमध्ये कोकणातल्या रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील अनुक्रमे 5 आणि एक आणि गोव्यातील एक ठिकाण अशा एकूण 7 कातळ खोदशिल्पे असलेल्या गावांचा समावेश करण्यात आला. ह्याचा पाठपुरावा प्रथमत: राज्य पुरातत्त्व विभाग आणि मग केंद्रीय पुरातत्त्व सर्वेक्षण ह्यांच्यामार्फत झाला. पुढील काळात ह्यातील एखादी जरी जागा जागतिक वारसा स्थळ म्हणून युनेस्कोने घोषित केली तर त्याचा कोकणातल्या पर्यटनावर फार मोठा परिणाम होईल. भारतात एकूण पर्यटनापैकी जवळपास 50% पर्यटन हे ऐतिहासिक आणि वारसास्थळांच्या ठिकाणी केले जाते. कोकणात आधीच धार्मिक आणि निसर्ग पर्यटन मोठ्या प्रमाणावर चालू आहे सोबतीला ह्याची भर पडली तर स्थानिकांना रोजगार मिळेलच सोबत स्थानिक पदार्थ, चालीरिती परंपरा, जीवनशैली ह्यांची सुद्धा जपणूक होऊन आर्थिक प्राबल्य निर्माण होईल.

कोकणाला खूप मोठा सांस्कृतिक ऐतिहासिक वारसा लाभला आहे. ह्या कातळ खोद चित्रांच्या रूपाने तो पुढे येत आहे. माणसाच्या उत्क्रांतीच्या एका महत्त्वाच्या टप्प्यावर निर्माण झालेली कला आणि तिचा इतिहास आपल्याकडे दडून बसला आहे जो जगासमोर आणणे महत्त्वाचे आहे. त्याबाबत आम्ही पाऊलपुढे टाकले आहे. आता आपल्या सर्वांच्या सहकार्याने हे काम पुढे न्यायचे आहे.

भारतात विशेषतः कोकणात रत्नागिरी जिल्ह्यातील रत्नागिरी, लांजा, राजापूर आणि देवगड तालुक्यात आणि तसेच सिंधुदुर्ग जिल्ह्यात जवळपास 50 ठिकाणी अशी कातळचित्रे आढळतात. रत्नागिरी, लांजा व राजापूर तालुक्यात 42 गावांमधून 850 कातळशिल्पे-चित्रे सापडली आहेत.

रत्नागिरी जिल्हा : जयगड, चवे, रामरोड, करबुडे, मासेबाव, निवळी, गोळप, निवळी-गोवडेवाडी, कापडगाव, उमरे, कुरतडे, कोळंबे, गणेशगुळे, मेर्वी, गावखडी, डोर्ले इत्यादी. जिल्ह्यात 490हून अधिक कातळशिल्पे आढळतात.

राजापूर तालुका : देवाचे गोठणे, सोगमवाडी, गोवळ, उपळे, साखरे कोंब, विखारे गोठणे, बारसू, पन्हाळे, शेंडे, कोतापूर, खानवली, देवीहतोळ, नाचण  इत्यादी. राजापूर तालुक्यात 290 हून अधिक कातळ-शिल्पे आढळतात.

लांजा तालूका : भडे, हरुचे, रुण, खानावली, रावारी, लोवगण इत्यादी या तालुक्यात 70 हून अधिक कातळ-शिल्पे आढळतात.

देवगड तालुका : वाघोटन, बापर्डे.

गोवा : उसगाळीमळ, महाराष्ट्र-गोवा सीमेवरील विर्डी, हिवाळ, कुडोपी.

सिंधुदुर्ग जिल्हा : सिंधुदुर्ग येथील शोधमोहीम सुरू असून देवगडमध्ये काही ठिकाणी सापडली आहेत. कुडोपी, वाघोटन आणि हिवाळे येथे कातळ-शिल्पे आढळून येतात. कोकणातील प्रामुख्याने कातळ सड्यांवर हे काम सुरू आहे. रत्नागिरी, लांजा, राजापूर येथील समुद्र किनाऱ्यापासून पूर्व दिशेला 25 किलोमीटर अंतरापर्यंत आणि दक्षिणोत्तर सुमारे 150 किलोमीटर अंतरात आणि 3700 चौरस किलोमीटर गावांमधील परिसरात कातळ चित्रे शोध संशोधन कार्य सुरु आहे. या कातळ शिल्प-चित्रांचा काळ मध्य अश्म युगीन म्हणजे इसवी सन पूर्व 10000 (दहा हजार वर्षे) असावा सिंधुदुर्गप्रमाणे कोकणातील ठाणे, रायगड या जिल्ह्यातील विविध ठिकाणी जांभा पाषाणावर चित्रे,नकाशे, काष्ठ शिल्पे, गुहा, लेणी, मंदिरे आढळून येतात.

चवा : मुंबई-गोवा महामार्गावरून गणपतीपुळ्याकडे  जाणाऱ्या  रस्त्यावर चवा गाव आहे. तेथील कातळशिल्पात तीन मानव आणि तीन प्राणी कोरण्यात आले आहेत. मानवाची धड विरहीत असून दोन्ही हात पसरलेले आहेत. दुसऱ्या मानवाच्या हातात फुलासारखा आकार दिसतो, तर तिसऱ्यात मानवाच्या बाजूला अस्वलासारखा प्राणी दिसतो.

दावूद :  येथील चित्रात एकशिंगी गेंडा, हरिणाच्या कुळातील प्राणी, काही अनाकलनीय प्राणी आणि भौमितीय रचना आहेत. गेंड्याचा कान आणि शिंग उठून दिसतात. या चित्रात गेंड्याचे अस्तित्व विस्मयकारक आहे कारण हा प्राणी कोकणात आता आढळत नाही. या आकृतीचा आकार 4 मीटर बाय 3 मीटर आहे. काही प्राणी माकड व कोल्ह्यासारखे दिसतात.

जांभरुण : या ठिकाणी मात्र 25 मीटर बाय 25 मीटर क्षेत्रफळात जवळपास 50 आकृत्या कोरल्या आहेत. त्यापैकी 8 मानवाकृत्या  तर इतर जलचर प्राणी आणि चतुष्पाद प्राण्यांचे आकार आहेत.

कोळंब : रत्नागिरी शहरापासून राजापूर सागरी मार्गावर 7 कि.मी. अंतरावर आहे. येथे 10 प्राणी आणि मानवाकृती आहेत. मानवाकृतीचा आकार मोठा असून इतर प्राणी प्राण्यांच्या प्रत्यक्ष आकाराएव्हढे आहेत. यातील हरणाची आकृती लक्षवेधी आहे. या हरणाला दुहेरी शिंगे, वळलेली शेपटी, उघडेतोंड इत्यादी बारकाव कोरलेले आहे.

कापडगांव : हे ठिकाण रत्नागिरीपासून 20 कि.मी. अंतरावर मुंबई-गोवा महामार्गावरील हातखंबा गावाजवळ आहेत. इथल्या चित्र समूहात मानव, कासव, मानवी पावले आणि काही भौमितीय आकृत्या कोरलेल्या आहेत.

कशेळी : हे स्थळ थोडे दुर्गम भागात असून रत्नागिरी-राजापूर रस्त्यावर गावखडी-गावडेवाडी बसस्टॉप पासून पाऊल वाटेने जावे लागते. दोन्हीकडून हे 40 कि.मी. अंतरावर आहे. इथले शिल्प भारतातील सर्वात मोठे कातळ-शिल्प असावं. इथल्या हत्तीची आकृती 18 मीटर बाय 13 मीटर इतकी भव्य आहे. हत्तीच्या अकृतिबंधाच्या पोटात वाघ, माकड, शार्क, गेंडा, स्टिंगरे, पक्षी, मोर यांसारख्या 70/80 प्राणी व पक्षी यांच्या आकृत्या आहेत.

देवीहसोळ : येथे जाण्यासाठी पावस-आडिवरे मार्गे भूगावाकडून पुढे देवी हसोळला पोचता येते. येथील आर्यादुर्गा मंदिराजवळ कातळ-शिल्पे आहेत. इथली चित्रे खरोखरच अनाकलनीय आहेत कारण आयतामध्ये वेगवेगळ्या भौमितीय रचना असून त्या कुठलाही प्राणी, पक्षी किंवा मीनवी आकृत्या नाहीत.

बारसू : राजापूर-आडिवरे रस्त्यावर बारसू हे गाव आहे. रत्नागिरीपासून 60 कि.मी.वर असून इथे दोन वाघांच्या मध्ये माणूस उभा असल्याची रचना मानवाच्या खऱ्या आकारापेक्षा मोठ्या प्रमाणावर कोरलेली आहेत.  माणसाच्या शेजारी मासा, ससा आणि मोर सुध्दा आहेत. माणसाच्या छातीवर योनी सदृश्य आकृती दिसून येते.

उक्षी : मुंबई-गोवा महामार्गावर हातखंब्याजवळ उक्षी गावात 6 मीटर बाय 6 मीटर आकाराचे हत्तीचा कातळ शिल्प आहे. हत्ती हा अतिशय देखणा असून त्याचा भव्य कान, शेपूट, सोंड व पाय हे सर्व अवयव सुबकपणे कोरलेले आहेत.

प्रागैतिहासिक गूढ आकृत्या – निवळीफाटा निवळी फाट्यापासून गणपतीपुळ्याकडे जाताना साधारण 800 ते 900 मीटरवर डाव्या बाजूस नारळाची झाडे दिसतात त्या झाडांच्या समोर रस्त्याच्या उजव्या बाजूस जमीनीवर काळ्या कातळावर काही गूढ आकृत्या कोरलेल्या दिसतात. चौरस आकारातील ह्या आकृत्या नेमक्या कशाच्या आहेत, त्या केव्हा कोरल्या गेल्या, त्याचा उद्देश काय यावर काहीच संशोधन झालेले नाही. कोरलेल्या एकसारख्या वााकार रेषा, आयत, त्रिकोण, अर्धवर्तुळ, उभ्या-आडव्या पट्ट्या, अशा आकृ्त्या आपणाला संभ्रमात टाकतात. तसेच काही मीटर पुढे रस्त्याच्या डाव्या बाजूस काळ्या कातळात खोदलेली विहीर आहे. तिला पायऱ्या खोदलेल्या असून त्याची रचना, वैशिष्ट्यपूर्ण आकार पाहाण्याजोगा आहे.

राजापूरच्या कातळावरही तब्बल 14 किलोमीटर अंतरावर अनाकलनीय शिल्पे आढळली आहेत. मासा, जलकुंभ, जलसर्प अशा जलस्थानाशी निगडीत चित्रविचित्र शिल्पाकृती आढळल्या आहेत. कोकणातल्या जांभा दगडाच्या कातळावर आढळणारी शिल्पे हा आजही मोठे गूढ आहे. ह्या आकृत्या कोणी आणि कधी खोदल्या असाव्यात याची नेमकी कोणालाही कालगणना आजतरी उपलब्ध नाही. एप्रिल-मे महिन्यात कातळावरचे सर्व गवत वाळल्यावर त्यावरील संबंधित आकृत्या दिसतात. कोकणातील जांभा दगडाचा विशेषतः कातळ रचनेचा अभ्यास करीत असताना असे आढळले की, इथल्या दुय्यम जांभा पठारावर ती कोरली गेली आहेत. कोकणातील आदिमानवाच्या अश्मयुगातील कालखंडातील ही कातळ-शिल्पे राज्य संरक्षित स्मारके होणार आहेत. आणि भविष्यात जागतिक पातळीवर संरक्षित वारसास्थळ म्हणून मान्यता पावतील. या अमोल कातळशिल्पामुळे कोकणच्या पर्यटनाला वेगळीच दिशा आणि भरीव चालना मिळेल. कातळशिल्पांसाठी राज्य सरकारने विशेष निधी मंजूर केला असून, त्या अंतर्गत त्यांच्या जतन संवर्धनाची योजना अंमलात येणार आहेत. कोकणवासीयांनी देखील या जागतिक स्तरावरच्या अमूल्य ठेव्याची जाण  ठेवून त्याच्या संरक्षण करावे.

-ॠत्विज आपटे

(व्यास क्रिएशन्स च्या कोंकण प्रतिभा दिवाळी २०२२ ह्या विशेषांक मधून प्रकाशित)

marathi.indiatimes.com
कातळशिल्पांचा प्राचीन वारसा
टीम मटा ऑनलाइन
8–11 minutes
-सतीश लळीत
दक्षिण कोकणातील सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी जिल्ह्यात गेल्या पंचवीस-तीस वर्षांत अनेक ठिकाणी आढळलेली कातळशिल्पे हा आता केवळ कुतुहलाचा विषय राहिलेला नसून तो अभ्यास आणि संशोधनाचा विषय झाला आहे. ६ मे २००१ रोजी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण तालुक्यातील हिवाळे येथील धनगरसड्यावरील कातळशिल्पे मी सर्वप्रथम उजेडात आणली, तेव्हापासून आतापर्यंत सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी जिल्ह्यात ७५हून अधिक ठिकाणी सुमारे दोन हजार कातळशिल्पे आढळली आहेत. जनजागृतीमुळे अलीकडे कातळशिल्पांचा शोध लागण्याचे प्रमाण वाढले आहे. रत्नागिरीच्या अगदी उत्तर टोकाच्या मंडणगड तालुक्याच्या बोरखत गावातील ते सिंधुदुर्ग जिल्ह्यातील नांदगाव-तोंडवली गावातील कातळशिल्पांचा यावर्षीच्या मार्चमध्ये लागलेला शोध हे सर्वांत अलीकडील शोध आहेत आणि यात सतत भर पडत आहे.

प्राथमिक अंदाजानुसार ही कातळशिल्पे म्हणजे प्रागैतिहासिक काळात या प्रदेशात वावरलेल्या भटक्या-संकलक मानवी टोळ्यांच्या ( Pre-historic hunter gatherer human tribes ) पाऊलखुणा आहेत. कातळशिल्पे खोदण्याचा कालावधी इसवीसन पूर्व २५ हजार ते इसवीसन पूर्व दोन हजार वर्षे यादरम्यान (मध्याश्मयुग ते नवाश्मयुग) असू शकतो. कातळशिल्पांचा कालावधी, उद्देश, अर्थ याबाबत एकमत नसले तरी, ती प्रागैतिहासिक काळातील असावीत आणि मानवी कलेचा तो प्रथम आविष्कार आहे, यात मात्र शंका नाही. मार्च २०२२ मघ्ये ‘युनेस्को’ने नऊ कातळशिल्प ठिकाणांचा समावेश ‘जागतिक वारसा स्थळां’च्या तात्पुरत्या यादीत केल्यामुळे हा विषय जागतिक पटलावर आला. त्यापैकी एक असलेल्या बारसू येथील कातळशिल्पांच्या परिसरात होत असलेल्या रिफायनरी प्रकल्पाच्या विरोधामुळे ही कातळशिल्पे राजकीय पटलावरही आली.

गेली २३ वर्षे मी सतत या विषयाचा अभ्यास करीत आहे आणि हिवाळेनंतर कुडोपी, खोटले, धामापूर येथील अनेक ठिकाणची कातळशिल्पे प्रकाशात आणली आहेत. कातळशिल्पांबाबत सविस्तर माहिती देणारे ‘सिंधुदुर्गातील कातळशिल्पे’ हे या विषयावरील पहिले पुस्तकही प्रकाशित केले आहे. कर्नाटक, राजस्थानसह अनेक ठिकाणच्या राष्ट्रीय पुरातत्त्व परिषदांमध्ये शोधनिबंध सादर करून, सातत्याने लेख लिहून हा विषय तज्ज्ञ आणि सर्वसामान्यांपर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न केला आहे. गेल्या २३ वर्षात सिंधुदुर्ग जिल्ह्यात हिवाळेनंतर कुडोपी, खोटले, हेदूळ, धामापूर, ओवळिये, किर्लोस, आरे, खुडी, तळेबाजार, वानिवडे, वाघोटण, मुणगे, साळशी, नांदगावसह अनेक गावांमधील आणि रत्नागिरी जिल्ह्यातही सुमारे ५० गावांतील दीड हजारांहून अधिक कातळशिल्पे, विशेषत: हौशी अभ्यासकांनी उजेडात आणली. रत्नागिरीच्या ‘निसर्गयात्री’ संस्थेने रत्नागिरी येथे कोकणातील कातळशिल्प आणि वारसा संशोधन या विषयावर आधारित कोकणातील पहिले ‘कातळशिल्प आणि वारसा संशोधन केंद्र’ ऑक्टोबर २०२३मध्ये सुरू केले. भारत सरकारचा विज्ञान आणि तंत्रज्ञान विभाग, आयआयटीएम प्रवर्तित टेक्नॉलॉजी फाऊंडेशन, आयआयटी मद्रास, आयआयटी हैदराबाद, जेएनयू दिल्ली यांच्या सहयोगाने हे केंद्र सुरू झाले आहे.

‘अज्ञाताच्या प्रांता’ची खिडकी किलकिली
कोकण प्रांताच्या प्रागैतिहासिक काळाबाबत फारसा अभ्यास झालेला नाही. याबाबतची साधनेही फार दुर्मिळ आहेत. इसवी सनाच्या आधी दोनतीन शतकांपासून कोकणच्या अनेक बंदरांमधून रोमसोबत व्यापार होत असल्याचे पुरावे आहेत. सुसरोंडी गुहा (पालशेत, गुहागर) आणि कोळोशी गुहा (नांदगाव, कणकवली) येथील उत्खननामध्ये कोकणातील पुराश्मयुगकालीन (सुसरोंडी - ९२ हजार वर्षे, कोळोशी - ५२ हजार वर्षे) मानवी वसाहतींचे प्राथमिक पुरावे सापडले आहेत. त्यानंतरच्या कालावधीत कोकण प्रदेशात मानवी संस्कृतीच्या पातळीवर काय घडामोडी होत्या, हे समजण्यास वाव नाही. म्हणून याला अज्ञाताचा प्रांत (डार्क एज) म्हटले जाते. परंतु, आता रत्नागिरी, सिंधुदुर्गातील कातळशिल्पांच्या शोधामुळे एक पाऊल पुढे पडले आहे. याचा एकात्मिक, तुलनात्मक व व्यापक अभ्यास पुरातत्त्वशास्त्रज्ञांनी केला तरच या अज्ञाताच्या प्रांतावर प्रकाश पडू शकेल. याची सुरुवात मात्र झाली आहे. सुसरोंडी, कोळोशी गुहा आणि कातळशिल्पे या अत्यंत महत्त्वपूर्ण शोधांमुळे कोकणातील मानवी वसाहतींबाबत व पश्चिम किनारपट्टीवरील मानवी संस्कृतीचा एक महत्त्वपूर्ण दुवा मिळाला आहे आणि या ‘अज्ञाताच्या प्रांता’ची खिडकी किलकिली झाली आहे. कोकणातील मानवी संस्कृतीचा विकास आणि पुरातत्त्वशास्त्र या दृष्टीने ही कातळशिल्पे खूप महत्त्वाची आहेत.

कातळशिल्पे किंवा रॉक आर्ट हा जागतिक पातळीवरील विषय आहे. गुहांच्या भिंतींवर नैसर्गिक रंगांनी चितारलेली गुहाचित्रे (पिक्टोग्राफ) आणि दगडांवर कोरलेल्या किंवा खोदलेल्या आकृत्या (पेट्रोग्लिफ्स) जगाच्या अनेक भागात आढळतात. प्रागैतिहासिक काळातील मानवाची ही कलात्मक अभिव्यक्ती हा पुरातत्त्वज्ञांप्रमाणेच सर्वसामान्य माणसाच्या कुतुहलाचा विषय आहे.

अश्मयुगीन मानवाच्या कलेचा आविष्कार

कातळशिल्पांमधील कलाकृती कोणत्या कालावधीत कोरण्यात किंवा खोदण्यात आल्या, हा प्रश्न हमखास विचारला जातो. याचे निश्चित उत्तर देता येत नाही, पण याबाबत काही अंदाज लावण्यात आले आहेत. एक नक्की की, हे सर्व प्रागैतिहासिक काळात, अश्मयुगात घडले आहे. परंतु, अश्मयुगाचा कालावधी हा प्रदीर्घ आहे. आद्य पुराणाश्मयुगामध्ये, म्हणजे सुमारे २० लाख वर्षांपूर्वी आफ्रिकेतील आदिमानवाने दगडी हत्यारे बनवल्याचे पुरावे आहेत. अश्मयुग जगाच्या विविध भागांत वेगवेगळ्या वेळी सुरू होते. त्यामुळे अश्मयुगाचा कालपट प्रदीर्घ आहे. जगभरात विविध ठिकाणी सापडलेल्या पाषाणकलेचा (गुहाचित्रे आणि कातळशिल्पे किंवा पाषाणशिल्पे) विचार केला तर साधारणत: २५ ते ३० हजार वर्षांपूर्वी म्हणजे मध्याश्मयुगात याची सुरुवात झाली असावी. मानवाची बुद्धी प्रगत होत गेली, तसतशी त्याने दगडी हत्यारांची निर्मिती, अग्नीचा वापर आणि नियंत्रण, निवारा, मृतांचे दफन, वस्ती, पशुपालन, मातीची भांडी, शेती असे प्रगतीचे एकएक टप्पे पार केले. याच दरम्यान त्याच्या अंगी कलावृत्तीचा जन्म झाला. हा सर्व प्रगतिक्रम लक्षात घेतला तर पाषाणकला ही इसवीसन पूर्व २५ हजार ते दोन हजार वर्षे या दरम्यानची आहे, असे म्हणता येईल. अर्थात हा केवळ अंदाज आहे.

दुसरा प्रश्न या कातळशिल्पांचा अर्थ काय? तसे पाहिले तर कातळशिल्पांचा अर्थ लावणे, अतिशय जटिल आहे. ही कातळशिल्पे खोदण्याचा अश्मयुगीन मानवाचा नेमका कोणता उद्देश होता, त्या चित्रांचा अर्थ काय, हे प्रश्न आजही बऱ्याचअंशी अनुत्तरित आहेत. गुहाचित्रांमधील प्राणी व त्यांच्या शिकारीच्या प्रसंगांची चित्रे किंवा कातळशिल्पांमधील प्राणी यांचा अर्थ काही प्रमाणात लागू शकतो. मेमरी ड्रॉइंग या चित्रकला पद्धतीनुसार त्याने हे पूर्वी पाहिलेले, अनुभवलेले चितारले किंवा खोदले. आपल्या पुढील पिढीला याची माहिती मिळावी, असाही त्याचा उद्देश असावा. मेंदूचा सतत होत असलेला विकास, सुचणाऱ्या संकल्पना, फावल्या वेळेचा सदुपयोग हे उद्देशही त्यामागे असतील. दुसरी एक शक्यता अशी की, या काळात ज्या भटक्या टोळ्या होत्या, त्या वेगवेगळ्या प्रदेशांत शिकारीनिमित्त फिरत. शिकारीवरून त्यांचा संघर्षही होत असणार. याकरिता विशिष्ट भूप्रदेशावरची आपली सत्ता सिद्ध करण्याचेही प्रयत्न त्याने केले असावेत. वन्यप्राणीही अशा प्रकारे आपल्या क्षेत्राच्या सीमा निश्चित करून घेतात. या सीमांच्या हद्दीत ते दुसऱ्या प्राण्याला येऊ देत नाहीत. एकाच ठिकाणी अशा प्रकारे सहज लक्ष वेधून घेतील, अशी चित्रे कोरून त्या टोळ्यांनी आपल्या हद्दी आखून घेतल्या असाव्यात, अशीही शक्यता आहे.

अनेक ठिकाणी आश्चर्यकारक अशा प्रमाणबद्ध भौमितिक अमूर्त रचना सापडल्या आहेत. अशा रचना कोरणारा मानव प्रगल्भ असला पाहिजे. बऱ्याचशा रचनांमध्ये चौकोन किंवा आयतांमध्ये आणखी काही चौकोन आखून त्यात नागमोडी रेषा खोदलेले शिल्पपट्ट आढळतात. गूढ नकाशांप्रमाणे या रचना भासतात. काही ठिकाणी वर्तुळे (circles), चक्री वर्तुळे (spirals), चक्रव्युह ( labirynths ) आढळून येतात. यांचा संबंध आकाशातील ग्रहतारे यांच्याशी किंवा खगोलांशी असावा का, हासुद्धा विचार करण्यासारखा प्रश्न आहे.

‘जागतिक वारसा स्थळां’च्या तात्पुरत्या यादीत

देशातील ‘जागतिक वारसा स्थळां’ची संख्या वाढविण्याच्या राज्य शासनाचा पुरातत्त्व व वस्तुसंग्रहालये विभाग आणि केंद्र सरकारच्या प्रयत्नांना मार्च २०२२ मध्ये मोठे यश मिळाले. केंद्र सरकारने पाठविलेल्या प्रस्तावांना ‘युनेस्को वर्ल्ड हेरिटेज सेंटर'ने हिरवा कंदील दाखवला. या प्रस्तावांमध्ये ‘कोंकणातील कातळशिल्पां’चा समावेश असून सिंधुदुर्गातील कुडोपी, रत्नागिरी जिल्ह्यातील सात, तर गोव्यातील एका कातळशिल्प ठिकाणाचा यात समावेश आहे. ही ठिकाणे ‘युनेस्को’च्या प्रस्तावित यादीत समाविष्ट झाली आहेत. कोकणाच्या पर्यटन विकासाच्या व मानवी पुरातन वारसा जतनाच्यादृष्टीने ही अभूतपुर्व घटना आहे. ही ठिकाणे पुढीलप्रमाणे १) कुडोपी (सिंधुदुर्ग), २) उक्षी, ३) जांभरुण, ४) कशेळी, ५) रुंधेतळी, ६) देवीहसोळ, ७) बारसु, ८) देवाचे गोठणे (सर्व रत्नागिरी) आणि ९) पोन्साईमळ (गोवा). ही ठिकाणे ‘जागतिक वारसा स्थळ’ म्हणून अंतिमरित्या जाहीर होण्यास अजून बरीच मोठी प्रक्रिया आणि अवकाश आहे; पण एक चांगली सुरुवात झाली आहे.

एकूणच कोकण प्रदेशातील मानवी संस्कृतीच्या विकासाचे धागेदोरे, प्राचीन मानवी वारसा, आदिम कला, पर्यटन विकासाची मोठी संधी अशा अनेक अंगांनी ही कातळशिल्पे खूप महत्त्वाची आहेत. ही सर्व कातळशिल्पे जांभ्या दगडाच्या पठारांवर आहेत. (ज्यांना कोकणात सडे म्हणतात.) आतापर्यंत दुर्लक्ष आणि अज्ञानामुळे अनेक कातळशिल्पे नष्ट झाली आहेत. या पठारांवरून बांधकामासाठी लागणारे दगड (चिरे) काढले जातात. या चिरेखाणींचा प्रचंड मोठा धोका कातळशिल्पांसमोर प्रश्नचिन्ह बनून उभा आहे. महत्वाच्या ठिकाणची कातळशिल्पे ‘राज्य संरक्षित स्मारक’ म्हणून जाहीर करणे, हा वारसा जपण्यासाठी ग्रामपंचायतींना अर्थसहाय्य करणे, जनजागृती करणे, अभ्यासक्रमात शक्य तेथे या विषयाचा समोवश करणे, असे उपाय योजले तरच हा वारसा भावी पिढ्यासाठी शिल्लक राहील.

हे झाले तर कोकणच्या पर्यटनक्षेत्राला एक नवा आयाम मिळेल. या कातळशिल्पांचा अधिक शास्त्रशुद्ध अभ्यास झाला तर कोकणातील मानवी अस्तित्वाच्या प्रवासावर नवा प्रकाश पडू शकेल. पण यासाठी शासनस्तरावर आवश्यक असलेली राजकीय व प्रशासकीय इच्छाशक्ती, स्थानिक जनतेचा सहभाग आणि रेटा निर्माण होऊन हे प्रत्यक्षात घडेल का, हा कळीचा प्रश्न आहे. या प्रश्नांची उत्तरे मिळेपर्यंत आशावादी राहायला हरकत नाही.

(लेखक हौशी पुरातत्त्व अभ्यासक व निवृत्त प्रशासकीय अधिकारी आहेत.)


wikiwand.com
कातळ खोदशिल्प - Wikiwand
6–8 minutes
कातळ खोदशिल्प
प्रागैतिहासिक काळातील सांस्कृृतिक संदर्भ म्हणून कातळशिल्पांचे विशेष महत्त्व आहे. आदिमानवाने दगडात विविध शिल्पे कोरून ठेवलेली आहेत. जगभरात अशा प्रकारच्या शिल्प किंवा चित्रांना राॅक आर्ट (Rock Art) किंवा पेट्रोग्लिफ्स (petroglyphs) या नावाने ओळखले जाते. ती कशाची चित्रे आहेत, त्यातून काय व्यक्त होते हे सांगणे अवघड आहे. विविध प्राणी, पक्षी अथवा काही अगम्य नक्षीकाम अशी ती गूढ खोदचित्रे आहेत. मुख्यत्वे लेण्यांच्या भिंतींवर केलेले कोरीव काम सर्वत्र आढळते; परंतु संपूर्णपणे उघड्यावर असलेल्या कातळावरील ही खोदचित्रे महाराष्ट्रात विशेषेकरून कोकणातच पाहण्यास मिळतात. [१]

Thumb
बारसू कातळशिल्प(३)
favicon

1 Sources

Thumb
बारसू कातळशिल्प(२)
महाराष्ट्र राज्यातील कोकण भागात विशेषतः रत्‍नागिरी जिल्ह्यातील रत्‍नागिरी, लांजा, राजापूर तसेच देवगड आणि सिंधुदुर्ग तालुक्यातील ५० गावांमध्ये अशी शिल्पे आहेत.

रत्‍नागिरी जिल्हा-
जयगड, चवे, रामरोड, करबुडे, मासेबाव, निवळी, गोळप, निवळी गावडेवाडी, कापडगाव, उमरे, कुरतडे, कोळंबे, गणेशगुळे, मेर्वी, गावखडी, डोर्ले इ.

राजापूर तालुका-
देवाचे गोठणे, सोगमवाडी, गोवळ, उपळे, साखरे कोंब, विखारे गोठणे, बारसू, पन्हाळे ,शेडे, कोतापूर, देवीहसोळ इ.

Thumb
देवाचे गोठणे येथील कातळशिल्प
लांजा तालुका-
भडे, हरचे, रुण, खानावली, रावारी, लावगण इ. देवगड आणि सिंधुदुर्ग येथील शोधमोहीम सुरू असून देवगडमध्ये काही ठिकाणे सापडली आहेत.[२]

देवगड तालुका-
वाघोटन ,बापर्डेत इ.

मालवण तालुका-
हिवळे

हिवाळे येथील कातळ खोदशिल्पे ६ मे २००१ रोजी हौशी पुरातत्व अभ्यासक सतीश लळीत ह्यांनी उजेडात आणली.मार्च २०२२ मध्ये युनेस्कोने नऊ कातळ शिल्प ठिकाणांचा समावेश जागतिक वारसा स्थळांच्या तात्पुरत्या यादीत केल्यानंतर कातळ शिल्प हा विषय जागतिक पटलावर आला आहे.[३]

favicon

2 Sources

कोकणातील प्रामुख्याने कातळ सड्यांवर हे काम सुरू आहे. रत्‍नागिरी,राजापूर,लांजा येथील समुद्र किना-यापासून पूर्व दिशेला २५ किलोमीटर अंतरापर्यंत आणि दक्षिणोत्तर सुमारे १५० किलोमीटरच्या अंतरात ३७०० चौरस किलोमीटर परिसरात समाविष्ट गावांमधील कातळ खोद शिल्पाचे संशोधनकार्य सुरू आहे.[२]

या शिल्पांचा काळ मध्य अश्मयुगीन म्हणजे सुमारे इसवी सन पूर्व १०००० वर्षे इतका असावा, असे अभ्यासक नोंदवतात.[२]

या सर्व रचना या कातळाच्या जमिनीवर पृष्ठभागावर आडव्या पद्धतीने कोरल्या गेल्या आहेत.
प्राण्यांच्या खोदलेल्या आकृती या प्रत्यक्षातील प्राण्यांच्या आकाराशी मिळत्या-जुळत्या आहेत.
पक्ष्यांच्या कोरलेल्या आकृती या प्रत्यक्षातील पक्ष्यांच्या आकारापेक्षा मोठ्या आकारात कोरलेल्या आहेत.
विशेषतः कोकणातील कातळ शिल्पातील प्राणी व पक्षी यांच्या आकृतींचा विचार करता भारतात अन्यत्र आढळून येणाऱ्या अशा शिल्पांच्या तुलनेत हे आकार मोठे आहेत.
ज्या प्राण्यांच्या अस्तित्वाचे पुरावे कोकणात आढळून येत नाहीत अशा प्राण्यांच्या आकृतीही यात कोरलेल्या आहेत, उदा. एकशिंगी गेंडा, पाणघोडा, इ.
येथील चित्रशैली पोर्तुगाल,ओस्ट्रेलिया येथील शिल्पांशी प्रथमदर्शनी साम्य दाखविते.[२]
एका प्रकारच्या या शिल्पांसाठी कातळावर ठराविक अंतराची चौकट खोदून घेतलेली दिसते. त्या चौकटीत ही शिल्पे कोरलेली असतात. त्यांना उठाव काहीसा कमी असतो. अशी शिल्पे कोकणात तुलनेने अत्यल्प आहेत.

दुसऱ्या प्रकारात सरळ रेषेच्या आधारे द्विमितीय चित्रे दिसतात. कोकणातील कातळशिल्पांमध्ये यांचे प्रमाण सर्वाधिक आहे. या शिल्पांमध्ये मनुष्याकृती, गोपद्मे व मासा, कासव, असे विविध प्राणी, पक्षी यांच्या आकृती, व सांकेतिक खुणा दिसतात. काही ठिकाणी भौमितिक रचनाही आढळतात. देवाचे गोठणे गावातील शिल्पात सड्यावरील दगडात विशिष्ट जागी चुंबकीय बदल दिसून येणारे शिल्प आहे.

प्राणी- चिन्ह स्वरूपात प्राण्यांची शिल्पे कोरलेली दिसतात. शिल्परचनेतील प्राणी आणि मूळ प्राणी यांच्या आकारात साम्य आढळते.
पक्षी- शिल्परचनेत पक्षी असण्याचे प्रमाण तुलनेने कमी आहे. मूळ पक्ष्यांच्या आकारात आणि शिल्पातील पक्ष्यांच्या आकारात फरक दिसून येतो.
जलचर आणि उभयचर प्राणी- प्रतिमा व मूळ आकार यांच्यात या शिल्पाकृतीत सारखेपणा दिसून येतो. समुद्री कासव, मगर, विविध प्रकारचे मासे यांची शिल्पे कोरलेली दिसून येतात.
मनुष्याकृती- या रचना मानवी शरीराच्या आकाराशी जुळणाऱ्या नसल्या तरी हे चित्रण सादृश्य (?) आहे असे दिसून येते. या प्रतिमा स्त्रीच्या आहेत की पुरुषाच्या आहेत हे कळण्याच्या दृष्टीने त्यावर कोणत्याही खुणा आढळत नाहीत.
गोपद्म/भौमितिक रचना- यांच्या आकारात विविधता असून या चिह्नांकित रेखाकृती या स्वरूपात कोरलेल्या दिसतात.
मातृदेवता- गुडघ्यापासून खाली मानवी पायाच्या रचनेतून कोरलेली अशा प्रकारची शिल्पे काही चित्रे आहेत. या रचना पाहता त्या मातृदेवता असाव्यात का यावर अभ्यासक संशोधन करीत आहेत.[२]
राजापूर, रत्‍नागिरी व लांजा तालुक्यात ४२ गावांमधून ८५० कातळशिल्पे सापडली आहेत. राजापूरजवळच्या गोवळ या गावातही मानवी संस्कृतीच्या प्रागेतिहास काळातील कातळशिल्पे आहेत. शोधकर्ते सुरेंद्र ठाकुरदेसाई, धनंजय मराठे आणि सुधीर रिसबूड या शोधकर्त्यांनी चार वर्षापासून ही मोहीम सुरू केली आहे. कातळशिल्पांच्या संरक्षणासाठी शासनाकडून प्रथमच निधी मंजूर झाला आहे. गावामध्ये खोदशिल्पांचा संदर्भ गोळा करणे, चौकशी करून मित्रमंडळी, ज्येष्ठ गावकऱ्यांकडून खात्री करणे व नंतर ती शोधून काढून नोंद करणे, नकाशे तयार करण्याचे काम केले जाते.[४]

favicon

1 Sources

या शिल्पाकृती समाजाला माहिती व्हाव्यात पण त्याच जोडीने त्यांचे रक्षणही व्हावे यासाठी व्यक्तिगत पातळीवर प्रयत्न सुरू आहेत. शाळा, महाविद्यालये यांच्या सहली किंवा विविध दूरचित्रवणी माध्यमातून या ऐतिहासिक वारशाची माहिती पोचविले जात आहे. यासाठी पुरातत्त्व खात्यालाही सहकार्य करण्यात येते आहे.

जगाच्या विविध भागांत आदिमानवाने खोदलेली कातळशिल्पे, दगडावर रेखाटलेली रंगचित्रे आढळून येतात. जगात ‘रॉक आर्ट’ म्हणून ती ओळखली जातात. मध्य प्रदेशातील प्रसिद्ध भीमबेटका येथील गुहेतील रंगचित्रे हा ‘रॉक आर्ट’चाच प्रकार आहे.[५]

favicon

1 Sources

मार्च २०२२ मध्ये युनेस्कोने नऊ कातळ शिल्प ठिकाणांचा समावेश जागतिक वारसा स्थळांच्या तात्पुरत्या यादीत केल्यानंतर कातळ शिल्प हा विषय जागतिक पटलावर आला आहे.[६]

favicon

1 Sources

कर्नाटकातील बदामी येथे ‘रॉक आर्ट सोसायटी ऑफ इंडिया’च्या १७व्या राष्ट्रीय परिषदेत सोसायटीचे सदस्य असलेल्या सतीश लळीत यांनी कुडोपी येथील कातळशिल्पांबाबतचा शोधनिबंध सादर केला. त्यात मालवण तालुक्यातील हिवाळे आणि कुडोपी येथील कातळशिल्पांची सविस्तर माहिती छायाचित्रांसह सादर करण्यात आली. कोकणातील पाषाण प्रस्तरावर निर्माण झालेली चित्र व शिल्प संस्कृती ही वैविध्यपूर्ण असून तिला ऐतिहासिक महत्त्व आहे. या कलात्मक संस्कृतीची निश्चित कालगणनाही अद्याप झालेली नाही. तसेच ही कलानिर्मिती कोणत्या कारणासाठी, कोणत्या हेतूने निर्माण झाली आणि कोणी केली, याबद्दलचे ठोस पुरावे अद्यापपर्यंत उपलब्ध झालेले नाहीत. त्यावर संशोधन सुरू आहे. त्यातून कोकण किनारपट्टीवरील हिवाळे आणि कुडोपीसारख्या पुरातत्त्वीयदृष्ट्या महत्त्वाच्या ठिकाणी या भागातील आदिम मानवी समूहाची वसतिस्थाने यांच्याबद्दल माहिती मिळू शकते, असा संशोधकांचा अंदाज आहे. त्यासाठी या ठिकाणांचे तज्ज्ञांकडून सातत्याने निरीक्षण होणे, हाती येणाऱ्या माहितीचा सयुक्तिक अर्थ लावणे, या कातळशिल्पांचा कालावधी निश्चित करणे इत्यादी मुद्द्यांवर लक्ष केंद्रित करावे लागेल.[७] कातळशिल्पांचा अभ्यास हा ऐतिहासिक दृष्टिकोनातून करणे पुरेसे नसते. त्या संशोधनासाठी पूरक म्हणून भौगोलिक बदल, पर्यावरणीय बदल, जैवविविधता यांचाही अभ्यास करणे आवश्यक असते.

favicon

1 Sources

Thumb

भीमबेटका गुहाचित्रे

Thumb

देवाचे गोठणे कातळशिल्पाचा चुंबकीय परिणाम

Thumb

परदेशातील कातळशिल्प

Thumb

बारसू कातळशिल्प (७)

Thumb

बारसू कातळशिल्प

Thumb

बारसू कातळशिल्प (५)


kokanmedia.in
पूर्वजांच्या पाषाणखुणांच्या शोधाची गोष्ट : कोकणातील कातळ-खोद-चित्रे - साप्ताहिक कोकण मीडिया
Kokan Media
43–55 minutes
गेल्या चार-पाच वर्षांत कोकणातील अनेक ठिकाणी अत्यंत महत्त्वपूर्ण खजिन्याचा शोध लागला आहे. तो खजिना म्हणजेच कातळ-खोद-चित्रे किंवा कातळशिल्पे. हा १० हजार वर्षांपूर्वीच्या मानवी उत्क्रांतीच्या टप्प्यातील ज्ञानाचा मोठा खजिना असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे. या चित्रांमधील विविध रचना, त्यांचे आकार, शैली, मिळालेली दगडी हत्यारे याच्या आधारे भारताच्या प्रागैतिहासिक कालखंडावर नव्याने प्रकाश टाकला जाऊ शकतो. पूर्वजांच्या पाषाणखुणा असलेल्या या वैशिष्ट्यपूर्ण गूढ रचनांचा शोध कसा लागत गेला, कोणत्या संकेतांच्या आधारे स्थानिक अभ्यासक वेगवेगळ्या रचनांपर्यंत पोहोचले, त्याच्याशी जोडलेल्या आख्यायिका कोणत्या आहेत, या ठेव्याच्या संरक्षणासाठी काय केले जात आहे, या गोष्टींबद्दल अनेकांना कुतुहल आहे. हे शोधकार्य ज्या स्थानिक अभ्यासकांनी कुतुहलाने केले आणि हा ठेवा जगासमोर आणला, ते सुधीर रिसबूड, धनंजय मराठे, प्रा. डॉ. सुरेंद्र ठाकूरदेसाई यांनीच मांडलेला हा शोधकार्याचा गूढरम्य प्रवास…
(साप्ताहिक कोकण मीडियाच्या २०१८च्या दिवाळी अंकातील लेख)
………………
रत्नागिरीच्या राजापूर तालुक्यातील बारसू गावाच्या सड्यावर धनगर समाजातील सुमारे ८० वर्षांच्या वृद्ध व्यक्तीबरोबर गप्पा सुरू असताना सड्याच्या दुसऱ्या टोकाला निर्देश करून ‘असे काहीतरी आहे’ असे त्या व्यक्तीने सांगितले आणि जवळपास दीड-दोन वर्षे अंधारात चालू असलेल्या आमच्या कातळ-खोद-चित्र शोधाच्या प्रवासाला आणि मानवी उत्क्रांतीच्या टप्प्यातील ज्ञानाचा एक मोठा खजिना समोर आणण्यासाठी खऱ्या अर्थाने दिशा मिळाली.

अशा प्रकारच्या चित्ररचनांकडे मानवाच्या कलात्मक उत्क्रांतीचा प्राथमिक टप्पा म्हणून पाहिले जाते. मानवी जीवनाच्या प्रदीर्घ इतिहासाच्या वेगवेगळ्या कालखंडात भौगोलिक व सांस्कृतिकदृष्ट्या भिन्न असलेल्या जगाच्या सर्वच भागांत पेट्रोग्लिफ्सची निर्मिती करण्यात आली आहे. सामान्यतः ही कला गुहेच्या भिंतींवर, उभ्या पाषाणाच्या बाजूंवर कोरलेली आहेत. परंतु कोकणात आढळणाऱ्या या कलेचे वैशिष्ट्यपूर्ण वेगळेपण म्हणजे इथे आढळणाऱ्या चित्ररचना तत्कालीन मानवाने उघड्या आकाशाच्या छताखाली कातळ सड्याच्या पृष्ठभागावर आडव्या स्वरूपात कोरल्या आहेत.



कोकणातील किनाऱ्याजवळच्या जांभ्या खडकांच्या खुज्या/कमी उंचीच्या पठारांना स्थानिक भाषेत सडा असे म्हणतात. जांभ्या खडकाच्या सच्छिद्रतेमुळे या पठारांची पाणी धारण करण्याची क्षमता खूप कमी आहे. त्यामुळे या सड्यांवर खुरट्या वनस्पती, पावसाळ्यानंतर उगवणारे गवत या व्यतिरिक्त वृक्षराई फारच अभावाने आढळते. या कारणांनी या पठारांवर आजही फारशी मनुष्यवस्ती आढळत नाही. अशा या सड्यांवर अश्मयुगीन मानवाच्या पाऊलखुणा म्हणजे कातळ-खोद-चित्रे मोठ्या प्रमाणावर आढळून येत आहेत. कातळ सड्यांवर कोरून निर्माण केलेल्या द्विमितीय चित्रांना शास्त्रीय भाषेत पेट्रोग्लिफ्स असे म्हणतात. प्रस्तुत लेख आहे तो या कातळ-खोद-चित्रांच्या शोध प्रवासाचा आणि त्यात आलेल्या अनुभवांचा.

या कातळ-खोद-चित्रांचा शोध हा खरे तर आमच्या ‘आडवळणावरचे कोकण’ या संकल्पनेतील एक भाग. कोकणभूमीची निर्मिती श्री विष्णूचा सहावा अवतार भगवान परशुराम यांनी केली, असे उल्लेख प्राचीन साहित्यातून आपल्यासमोर येतात. भगवान परशुरामांच्या आईचे- रेणुकेचे नाव कुंकणा असे होते. त्यावरून या भूभागाला कोकण असे नाव पडले, असे उल्लेख पुराणातून येतात. अपरान्त म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या भागाला इसवी सनाच्या पाचव्या-सहाव्या शतकापासून कोकण या नावाने ओळखले जाते. अपर या शब्दाचा अर्थ पश्चिम असाही आहे. पश्चिमेच्या शेवटच्या टोकाचा (अन्त) प्रदेश म्हणजे अपरान्त. आजपर्यंत आपण कोकणाचा हा इतिहास शिकत, ऐकत आलो आहोत. परंतु अलीकडे आढळून येत असलेल्या कातळ-खोद-चित्रांमुळे कदाचित कोकणाचा इतिहास नव्याने लिहावा लागेल.

आज ठाणे, रायगड, रत्नागिरी व सिंधुदुर्ग हे चार जिल्हे म्हणजेच कोकण म्हणून ओळखले जाते. भौगोलिकदृष्ट्या सह्याद्री आणि अथांग महासागर यामधील चिंचोळी पट्टी म्हणजे कोकण. डहाणू ते महाड या भागाला उत्तर कोकण, तर कशेडी घाटापासून सिंधुदुर्गातील तेरेखोलच्या खाडीपर्यंतच्या भागाला दक्षिण कोकण म्हणून ओळखले जाते. हवामानदृष्ट्या हा प्रदेश सारखाच असला, तरी उत्तर कोकण व दक्षिण कोकण हे प्रदेश भू-शास्त्रीयदृष्ट्या भिन्न व्यक्तिमत्त्व असलेले प्रदेश आहेत. कोकणाची ओळख असलेला जांभा दगड हा प्रामुख्याने दक्षिण कोकणात आढळून येतो. दक्षिण कोकणाचा हा जांभ्या दगडाचा भूप्रदेश आपल्या अंगा-खांद्यावर, पोटात अनेक रहस्ये घेऊन बसला आहे. त्याचबरोबर हा प्रदेश वैविध्यपूर्ण बाबी, जैवविविधता आणि संस्कृतीच्या विविध अंगांनी ओतप्रोत भरलेला आहे. खरे सांगायचे झाले, तर उभ्या महाराष्ट्रात कोकणासारखा प्रदेश नाही. परंतु ठराविक ठिकाणे, गोष्टी या पलीकडचा कोकण प्रदेश आम्हा कोकणातील लोकांनाच माहिती नाही. निसर्गप्रेमातून आमची भटकंती सुरू झाली आणि या बाबी आमच्या समोर येऊ लागल्या. त्यातूनच जन्माला आली, ती ‘आडवळणावरचे कोकण’ ही संकल्पना.


निवळी येथील कातळ-खोद-चित्रे. (लेखात सर्वांत आधी दिलेला फोटो उक्षीच्या कातळ-खोद-चित्राचा.)
कातळ-खोद-चित्रांच्या शोधप्रवासाला सुरुवात केली, त्या वेळी या विषयातील कोणतेही ज्ञान आम्हाला नव्हते. डोळ्यासमोर होत्या त्या निवळी, देवीहसोळ येथील एक-दोन चित्ररचना. काहीतरी पुरातन आहे, एवढाच काय तो आमचा या चित्रांशी संबंध. प्रा. प्र. के. घाणेकर यांच्या भेटीत या चित्रांचे महत्त्व समजले. आणि ती चित्रे मनावर कोठे तरी कोरली गेली होती.
बारसूच्या सड्यावर भेटलेल्या व्यक्तीने आमच्या चौकशीतील निसटत असलेली कडी गुंफून दिली. त्या भल्याथोरल्या सड्यावर निव्वळ अंगुलीनिर्देशानुसार मिळालेल्या माहितीवरून संबंधित ठिकाण शोधणे म्हणजे एक आव्हानच होते. तुटपुंज्या माहितीच्या जोरावर, दिशादर्शनातून मिळालेल्या ठिकाणी पोहोचलो. हे ठिकाण म्हणजे राजापूर तालुक्यातील गोवळ गावाचा सडा. गावातून सड्यावर येण्यासाठी असलेली पाखाडी. पाखाडी चढताना आजूबाजूच्या निसर्गसौंदर्याचा आस्वाद घेत सड्यावर पाऊल टाकले. नकळतच ‘अरे बापरे’ हे शब्द बाहेर पडले. एवढ्या मोठ्या सड्यावर शोधणार कसे? मिळालेल्या भौगोलिक माहितीच्या आधारे नजरेसमोर एक भासमान क्षेत्र उभे केले. अर्थात त्यासाठी आपल्याला बोलीभाषेतील शब्द, खुणा यांची थोडीफार तरी जाण असावी लागते. ‘हे फडे तिकडे सातवीण त्या अंगाला खरी’ करत प्रत्येक पावलागणिक पायाखाली पाहत मार्गक्रमणा सुरू झाली. थोड्या वेळात ‘इथे काही तरी आहे’ असे शब्दोच्चार झाले. अगदी पुसटपणे दिसत असलेल्या चित्रांना कोणत्याही प्रकारे धक्का लागणार नाही याची काळजी घेऊन साफसफाई सुरू केली. काम करता करता ‘अरे इथे पण आहे, तिकडे पण,’ असे करत करत तब्बल ४२ चित्ररचनांचा समूह समोर आला. या चित्ररचनांमध्ये प्राणी, पक्षी, अनाकलनीय अशा भौमितिक रचना यांचा समावेश होता. प्रत्यक्ष शोधाच्या पहिल्याच पावलावर मिळालेले हे यश आम्हाला आनंद देऊन गेले. हे काम करत असताना त्या वेळचे वातावरण मात्र असह्य करणारे होते. वातावरणातील हा फरक आम्हाला लक्षात येत नव्हता. शक्य तेवढ्या लवकर काम आटोपून तिथून परत फिरण्याचा निर्णय आम्ही घेतला. मुक्कामी परतेपर्यंत एका मोठ्या वादळी पावसाने आम्हाला गाठले आणि वातावरणात झालेल्या फेरबदलाचे कारणदेखील समजले. एका वेगळ्या विषयातील आमचा प्रवेश, सोबत निसर्गातील वेगवेगळे अनुभव यांची व्याप्ती पुढे खूप मोठ्या प्रमाणावर जाईल, याची आम्हाला त्या वेळी कल्पना नव्हती.

अधिक माहिती जाणून घेण्यासाठी आम्हाला परिचित असलेले प्र. के. घाणेकर, डेक्कन महाविद्यालयाचे डॉ. सचिन जोशी व रवींद्र लाड या तज्ज्ञ व्यक्तींशी संपर्क साधला. आम्हाला मिळालेल्या रचना खूपच पुरातन असाव्यात, असा अंदाज त्यांनी व्यक्त केला. त्यावर अधिक अभ्यास करणे गरजेचे आहे, असेही मत त्यांनी व्यक्त केले. हाती लागलेला खजिना कोकणाच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण हे लक्षात आले. ही गोष्ट सर्वांसमोर जाण्यासाठी प्रसारमाध्यमांकडे धाव घेतली. त्याच वेळी महाराष्ट्र राज्याच्या सांस्कृतिक खात्याचे मंत्री विनोद तावडे रत्नागिरी दौऱ्यावर होते. त्यांना भेटून माहिती देण्याचा प्रयत्न केला; पण ती भेट म्हणजे आम्ही निवेदन देणे आणि त्यांनी ते गोड हसत स्वीकारणे, या पलीकडे काही नव्हते. आज हा विषय जगाच्या पाठीवर पोहोचला आहे. असे असतानादेखील त्या खात्याचा प्रतिसाद आजपर्यंत तसाच आहे.

दरम्यानच्या काळात या शोधाच्या आमच्या आतापर्यंतच्या वाटचालीची उजळणी केली. आज सर्वज्ञात असलेला कातळ-खोद-चित्र हा शब्द त्या वेळी सर्वसामान्य माणसांना माहीतदेखील नव्हता. त्या संदर्भात एखाद्याला काही माहिती असल्यास त्याची ओळख निराळी होती. तज्ज्ञ मंडळींकडून मिळालेली माहितीही अत्यंत त्रोटक होती. आम्हाला आलेल्या अनुभवांतून आमची चौकशीची दिशा बदलली. कार्यप्रणालीमध्ये बदल केले. आमच्या बदलेल्या कार्यपद्धतीला यश आले. अल्पावधीतच आठ ते १० ठिकाणी असे काही तरी आहे, अशी माहिती समोर आली. आमची शोधमोहीम तीन टप्प्यांत विभागलेली होती. पहिला टप्प्यात मिळालेल्या संदर्भानुसार खात्री करण्याचा समावेश होता. त्यानुसार खात्री करण्यात आली आणि पाच-सहा ठिकाणी चित्ररचना असल्यावर शिक्कामोर्तब झाले.

दुसऱ्या टप्प्याच्या मोहिमेची कल्पना तत्कालीन जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. संजय शिंदे यांना दिली. शिंदे सर म्हणजे एक निसर्गप्रेमी आणि वर्दीमागील संवेदनशील व्यक्तिमत्त्व. समान आवडीच्या विषयातून ऋणानुबंध जुळून आले. आमच्या गप्पांमध्ये ते एक गोष्ट सातत्याने सांगायचे, की एखादे चांगले काम निःस्वार्थी भावनेने आणि सर्वस्व अर्पून हाती घेतले, की निसर्गही त्याला साथ देतो; आपल्या नकळत ते काम पूर्ण होण्याच्या दृष्टीने वेळोवेळी तशी परिस्थिती निर्माण करतो. गरज असते ती ओळखण्याची. आमच्या कातळ-खोद-चित्रांच्या शोधमोहिमेत त्यांच्या या सांगण्याची प्रचीती आम्हाला सातत्याने येत गेली. त्यांनी लगेचच त्यांच्या परीने मदत देऊ केली. त्यांनी देऊ केलेली ही मदत मोलाची होती. प्रत्यक्ष-अप्रत्यक्षपणे या मदतीचा आम्हाला फायदा झाला. लोकांशी संवाद साधणे सोयीचे गेले.

शोधाच्या या टप्प्यावर एकंदर पाच गावांचा समावेश होता. ही सर्व गावे राजापूर तालुक्यातील होती. (१) सफाईसाठी आवश्यक साहित्य व सोबत्यांसह भालावली गावाच्या सड्यावर पोहोचलो. परिसराची पाहणी करताना पुरातन गोष्टींकडे पाहण्याच्या आपल्याकडील लोकांच्या मानसिकतेचे यथार्थ दर्शन झाले. बहुतांशी चित्रपरिसर बाजूच्या रस्त्यामध्ये व गटारामध्ये नष्ट झाला होता. उर्वरित भागातील चित्रे शोधून साफसफाई केली. या चित्रांमध्ये गोपद्मसदृश भौमितिक रचना, मगर, वराह, पाऊल, ठसे वगैरे रचनांचा समूह मिळाला. या ठिकाणाची कथा येथे संपत नाही. पुढे आम्ही चालविलेल्या प्रयत्नांना रत्नागिरी जिल्हा परिषदेने साथ दिली. या ठिकाणाच्या विकासाकरिता जिल्हा परिषदेकडून निधी मंजूर झाला, असे कळले. या परिसराचा विकास तर सोडाच, परंतु याच ठिकाणी झालेल्या अन्य एका शासकीय कामात चित्रपरिसराला धक्क्का बसून दोन-तीन चित्रे कायमस्वरूपी नष्ट झाली आहेत. एकंदर घडलेल्या सर्व प्रकारातून लोकांची आस्था नक्की कशात आहे, यावर मात्र आमच्या मनात प्रश्नचिन्ह उभे राहिले.

बरोबर उलटा अनुभव सोलगावात आला. (२) तिथे पोहोचलो, तेव्हा त्या गावचे काही ग्रामस्थ आणि पोलीस पाटील वाट पाहत होते. गावातून घाटीने चित्रपरिसरात पोहचण्यास सुमारे अर्धा तास चालत जावे लागते. या ठिकाणी असलेल्या रचनांना एक आख्यायिका चिकटलेली आहे. सड्यावर वावरणारी गावातील वृद्ध मंडळी चित्रपरिसराला भोपळिणीचा वेल म्हणून ओळखतात. या वेलाचे मूद (मूळ) ज्याला सापडेले, त्याला संपत्ती मिळेल अशी धारणा. या समजापोटी या चित्रपरिसरात एका चित्रावर पहारीने खणल्याच्या खुणा आहेत. साफसफाई केल्यावर चित्ररचना स्पष्ट झाल्या. या रचनांमध्ये गवा रेडा, वाघ व एका अनाकलनीय चित्ररचनेबरोबर मोठ्या आकाराची भौमितिक रचना आढळून आली.

परतीच्या वाटेवर आपापसांत झालेल्या गप्पांमधून एक निराळीच गोष्ट समोर आली. या चित्रपरिसरापासूव थोड्या अंतरावर जांगळी लोकांचा देव आहे. या सड्यावर येण्यासाठी जेथून चालायला सुरुवात करतो, तिथे गांगो मंदिर (गांगेश्वर) आहे. देवाला कौल लावण्याची प्रथा कोकणात हजारो वर्षांपासून आहे. येथे गांगेश्वराला कौल लावला जातो. कधीकधी गांगेश्वर कौल देत नाही. जांगळी लोक ज्या वेळी त्यांच्या देवाला कौल लावतात, त्या वेळी गांगेश्वर कौल देत नाही, असा समज इथे आहे. एक वेगळीच गोष्ट.

आपल्या गावातील प्राचीन ठेवा जपण्यासाठी आवश्यक ती सर्व मदत देण्याचे आश्वासन सोबत असलेल्या गावकऱ्यांनी दिले. त्यांचे हे आश्वासन राजकीय नेते, सरकार यांसारखे नव्हते. ती जागा मूळ मालकाने काही कारणास्तव विकायला काढली आणि असलेल्या चित्रांचे संरक्षण करण्याच्या अटीवर नवीन माणसाने ती जागा विकत घेतली. ग्रामस्थांच्या सहकार्याने त्या चित्रांभोवती तात्पुरत्या स्वरूपात का होईना, चिऱ्यांच्या दगडांची रांग लावून ती जागा कायमस्वरूपी अधोरेखित केली आहे. योग्य माहिती मिळाल्यावर पुरातन ठेवा जपण्यासाठी तेथील लोकांची धडपड खरेच कौतुकास्पद आहे.

असाच अनुभव आम्हाला देवाचे गोठणे या गावात आला. (३) लोकसंख्या व क्षेत्रफळानुसार राजापूर तालुक्यातील हे सर्वांत मोठे गाव. या गावात कोकणाचा निर्माता श्री भार्गवरामाचे म्हणजेच परशुरामाचे मंदिर आहे. या मंदिराला सुमारे ३५०-४०० वर्षांचा इतिहास लाभला आहे. इ. स. १७१० ते १७२०च्या दरम्यान ब्रह्मेन्द्र स्वामी यांनी मूळच्या गोवर्धनेश्वर मंदिराचा जीर्णोद्धार केला व श्री भार्गवरामाच्या मंदिराची स्थापना केली. येथे असलेली भार्गवरामाची मूर्ती आगळीवेगळी असून, अशा प्रकारची मूर्ती अन्यत्र कोठेही पाहायला मिळत नाही. फरसबंदीयुक्त प्राकार असलेले मुघल-मराठा मिश्र शैलीतील हे मंदिर पाहणे, अनुभवणे हा एक स्वतंत्र विषय आहे. जैवविविधतेने संपन्न असलेल्या या देवाचे गोठणे गावाच्या सड्यावर व परिसरात निसर्ग नवलाई व आश्चर्येदेखील पाहायला मिळतात. मंदिराजवळच्या सड्यावर सुमारे साडेसात फूट लांबीची मनुष्याकृती कोरलेली आहे. या रचनेची स्थानिक ओळख रावण अशी आहे. त्यावरून या सड्याला रावणाचा सडा असेही ओळखले जाते. सीतेच्या शोधात निघालेला रावण या ठिकाणी ठेच लागून उताणी पडला. त्याचा उमटलेला हा ठसा, अशी मजेशीर आख्यायिका या चित्ररचनेच्या बाबतीत सांगितली जाते. या चित्ररचनेच्या आजूबाजूला आणखीही काही रचना आहेत; पण त्या फार अस्पष्ट आहेत. या रचनांचा शोध घेत असताना आम्हाला एक अनोखी गोष्ट मिळाली.

गावागावातून चौकशी करणे, संदर्भ जाणून घेणे, मिळालेल्या संदर्भांनुसार ठिकाणाचा शोध घेणे, ठिकाणाची खात्री झाली की तिथे शोधमोहीम राबविणे, त्या जागेची साफसफाई वगैरे करत चित्ररचना उजेडात आणणे, जागेचा संपूर्ण तपशील नोंद करणे, दिशा, अक्षांश-रेखांश यांची नोंद करणे, जागेचा नकाशा बनविणे, चित्ररचनांचा नकाशा तयार करणे, आजूबाजूच्या विविध गोष्टींची नोंद घेणे, आख्यायिका, प्रथा वगैरे समजून घेणे… असे म्हणजे थोडक्यात सांगायचे झाले, तर त्या जागेचा संपूर्ण दस्तऐवज तयार करण्याचा प्रयत्न आम्ही अंगीकारला होता.. अगदी सुरुवातीपासूनच.

या ठिकाणाचा असा दस्तऐवज तयार करताना त्या परिसरातील एका नैसर्गिक चमत्काराचा शोध आम्हाला लागला. तो चमत्कार होता चुंबकीय विस्थापनाचा. कातळचित्र आणि आजूबाजूच्या ठराविक परिसरात होकायंत्रातील चुंबकसुई योग्य दिशादर्शन करत नाही, असे लक्षात आले. होकायंत्रातील चुंबकसुई उत्तर दिशा न दाखवता कधी घड्याळ्याच्या काट्याच्या दिशेने, तर कधी विरुद्ध दिशेने, तर काही ठिकाणी ती स्वतःभोवती फिरतच राहते, हे लक्षात आले. एक आश्चर्यकारक गोष्ट समोर आली. काही वेळ विश्वासच बसेना. या ठिकाणी कोणत्या तरी चुंबकीय क्षेत्राचा प्रभाव अधिक असल्याने हे घडत आहे, हे लक्षात आले; पण हा विषय सोबत असलेल्या ग्रामस्थांच्या आकलनापलीकडचा होता. एक तर या चित्रपरिसराला रावणाचा सडा म्हणतात. त्यामुळे काही ना काही श्रद्धा-अंधश्रद्धा चिकटलेल्या. त्यात त्यांच्या डोळ्यासमोर होकायंत्रातील गोलगोल फिरणारा काटा. ग्रामस्थांच्या चेहऱ्यावर आश्चर्य आणि भीतीचे भाव उमटले होते. त्यातूनच त्यांनी ‘साहेब आपल्या हातून कळत-नकळत काही चूक झाली आहे का? असेल तर आपण इथे नारळ देऊ या’ अशी विनंतीवजा सूचना केली. स्थानिक लोकांमध्ये या गोष्टी किती खोलवर रुजल्या आहेत, याचे दर्शन झाले.

चुंबकीय विस्थापन हे प्रकरण स्वस्थ बसू देत नव्हते, दगडातील चुंबकीय घटकांमुळे हे घडते आहे, हे जरी लक्षात आले असले, तरी नक्की काय हे जाणून घेण्याची धडपड चालू होती. भूगोल विषयातील नामांकित प्राध्यापक डॉ. श्रीकांत कार्लेकर यांची भेट घेतली. ते स्वतः या ठिकाणी आले. त्यांनीदेखील आश्चर्य व्यक्त केले. त्यांच्या मार्गदर्शनाखाली गोगटे जोगळेकर महाविद्यालयाच्या भूगोल विषयाच्या विद्यार्थ्यांच्या सहकार्याने या चुंबकीय विस्थापन क्षेत्राचा प्राथमिक नकाशा तयार करण्यात आला. त्यातून पुढे आलेले अनुमान आणखी कोड्यात टाकणारे निघाले. जांभ्या दगडात चुंबकीय विस्थापन दाखविणारी ही जगातील एकमेव जागा आहे हे आमच्या अभ्यासातून समोर आले आहे. कोकणाच्या भौगोलिक व पर्यटनदृष्ट्या ही फार मोठी उपलब्धी आहे, यात शंका नाही. येथील चुंबकीय विस्थापन, तसेच जागामालक नीलेश आपटे व त्यांचे कुटुंबीय आणि ग्रामस्थ, त्यांची मिळालेली साथ, तिथला परिसर हा अजून एका स्वतंत्र लेखाचा विषय आहे.

येथून आमचा पुढचा प्रवास होता (४) हातिवले-अणसुरे मार्गावरील जुवाठी-उपळे गावातील. या ठिकाणी मार्गदर्शन करणारे कोणीच नव्हते. ‘सातविणीच्या बुंध्याखाली’ एवढाच काय तो संदर्भ. सातवीण म्हणजे कातळ सड्यावर उंच वाढणारे एक झाड. या ठिकाणी एक मोठी चौकोनी आकाराची उठावाची भौमितिक रचना आहे. निवळी मार्गावरील रचनेसारखी. त्याच्या लगतच असलेली मातृदेवता असावी, अशी रचना लक्षवेधक आहे. आम्हाला या चित्राचा संदर्भ मिळाला होता. नोंद करत असताना एका लहानशा अपघातात जवळच असलेल्या तब्बल ३५ फूट लांब व २४ फूट रुंद अशा चित्ररचनेचा शोध लागला. ही रचना एका नजरेत सामावत नाही. या चित्ररचनेचा नकाशा तयार केल्यावर ती रचना एका उडणाऱ्या पक्ष्याची आहे हे लक्षात आले. एकंदर रचनेवरून हे चित्र ससाणा या प्रजातील पक्ष्याचे असावे, असे वाटते. तोंडात बोट घालायला लावणारे हे चित्र. या चित्ररचनेसोबत प्राणी, मासे, मनुष्याकृती वगैरे आठ-१० रचना या परिसरात आहेत.

या परिसरातील एक वेगळी प्रथा अनुभवायला मिळाली. ढोल-ताशा हा कोकणातील एक पारंपरिक वाद्य प्रकार. इथे दोन मेळ्यांमध्ये (गटांत) ढोल-ताश्यांच्या बोलातून स्पर्धा भरते. जाखडी नृत्यप्रकारात असणाऱ्या सवाल-जबाबसारखे सवाल-जबाब ढोल-ताश्यांच्या बोलातून एकमेकांसमोर ठेवले जातात. कोकणाची कला-समृद्धी दाखविणारा हा वाद्यप्रकार. (५) देवीहसोळ गावाच्या सड्यावर आर्यादुर्गा देवीचे मंदिर वसले आहे. उपळे येथे असलेल्या चौकोनी आकाराच्या मोठ्या रचनेसारखी, पण अत्यंत सुस्पष्ट रचना या मंदिराच्या परिसरात आहे. या चित्ररचनेच्या आजूबाजूला अस्पष्ट अवस्थेत आणखी काही रचना आढळून येतात.

मार्गशीर्ष वद्य अष्टमीला येथे उत्सव साजरा केला जातो. जवळच्या भालावली गावाची देवी पालखीतून आर्यादुर्गा देवीला भेटायला येते. भेटीपूर्वी देवीची पालखी मांडावर थांबते. हा मांड म्हणजे कातळ चित्रातील चौकोनी आकाराची उठावाची मोठी भौमितिक रचना. मांडावर पालखी ठेवल्यावर देवळातील गुरव त्या रचनेच्या मधोमध असलेल्या खड्ड्यावरील दगड बाजूला करून साप बाहेर काढून देवीवरून ओवाळून परत त्याला खड्ड्यात ठेवतो. हा साप देवीचे वाहन आहे, असे मानले जाते. या वेळी कोकणात आढळून येणारा अत्यंत धोकादायक आणि विषारी असा हा फुरसे नावाचा साप चावल्याची घटना आजतागायत एकदाही घडलेली नाही.

कातळचित्र आणि त्याच्याशी निगडित परंपरा असणारे हे एकमेव ठिकाण. लोकांशी झालेल्या बोलण्यातून तेथे असलेली रचना नक्की काय आहे याची माहिती कोणाला नाही, असे लक्षात आले. काही तरी वेगळे आहे, त्याचा देवतेशी संबंध असावा या विचारातून या ठिकाणी पालखी ठेवण्याची प्रथा सुरू झाली. या माहितीमुळे मुख्य रचनेच्या आजूबाजूला असलेल्या चित्रांची झीज होण्याचे कारणही समजले.

दरम्यानच्या काळात या शोधाच्या बातम्या स्थानिक वृत्तपत्रांतून प्रसिद्ध झाल्या. आकाशवाणी रत्नागिरी केंद्रावरून बातमीवजा वृत्त प्रसिद्ध झाले. ‘एबीपी माझा’ या वाहिनीवरून प्रसारण झाले. हा विषय बऱ्यापैकी सर्व लोकांपर्यंत पोहोचला. व्यक्तिगत चौकशी, वृत्तपत्रांतील बातम्या यातून नवीन संदर्भ हाती येऊ लागले. सगळेच संदर्भ बरोबर होते असे नाही; पण आपणहून पुढे येऊन माहिती द्यायच्या लोकांच्या प्रयत्नांना मान देणेही तेवढेच आवश्यक होते. शेकडो किलोमीटरची पायपीट चालू होती.

राजापूर तालुक्यातून मिळत असलेल्या संदर्भांबरोबर आता रत्नागिरी तालुक्यातून मिळालेल्या संदर्भांवर लक्ष केंद्रित केले. रत्नागिरी-पावस मार्गावर (६) गोळप सड्यावर चित्र आहे, यावर शिक्कामोर्तब झाले. येथे एका माकडाचे चित्र सापडले. त्याच्या बाजूला एक चौकोन अशी दोन चित्रे. निवळी-गणपतीपुळे मार्गावरील (७) करबुडे फाट्यापासून काही अंतरावर असलेल्या ठिकाणी गोपद्मसदृश भौमितिक रचनांचा समूह आढळून आला. आकाराने कमी-जास्त असल्या, तरी सर्व रचना एकसारख्या आहेत. या व्यतिरिक्त अन्य रचना येथे आढळून येत नाहीत. या भागाला गोनीचा कातळ म्हणून ओळखले जाते. धान्य वाहून नेणाऱ्या गाड्या या ठिकाणी जमिनीत रुतल्या, त्यांच्या चाकांचे उमटलेले हे ठसे, अशी आख्यायिका या चित्रपरिसराबाबत स्थानिक लोकांकडून सांगितली जाते. चित्रांचे आकार, त्यांचा पसारा पाहता आख्यायिका आणि चित्ररचना यांचा एकमेकांशी काही संबंध असावा, असे जाणवत नाही. काही गोलगोल रचना पाहून नंतरच्या कालखंडात ही आख्यायिका या चित्रांना चिकटली असावी, असे वाटले. एकाच प्रकारच्या रचना असलेले आतापर्यंतच्या शोधातील हे एकमेव ठिकाण.

एका अज्ञात व्यक्तीने दिलेल्या माहितीवरून मेर्वी गावाच्या सड्यावरील चित्ररचनांचा शोध लागला. पावस-पूर्णगड मार्गावर असलेले हे गाव. मिळालेल्या संदर्भानुसार, या गावातील मधुकर गुरव ठिकाण दाखविण्यास सोबत आले. चालता चालता माहिती घेण्याचे काम सुरू होते. काही तरी चित्रविचित्र खुणा आहेत, त्यांचा काही अर्थ लागत नाही, असे त्यांचे सांगणे. त्यांनी एक आख्यायिका सांगितली. कोणे एके काळी या गावातील एका व्यक्तीला एक अनाहूत तेजःपुंज माणूस भेटला. ‘तुला संपत्ती देतो,’ असे सांगून तो त्याला चित्रपरिसरात घेऊन आला. तेथे असलेल्या एका मोठ्या गुहेत त्यांनी प्रवेश केला. ही गुहा सोने-नाणे वगैरे गोष्टींनी भरलेली होती. गावातील त्या माणसाचा स्वतःवर विश्वास बसेना. ‘माझी अट पाळलीस, तर ही सगळी संपत्ती तुझी,’ असे सांगून ती तेजःपुंज व्यक्ती अंतर्धान पावली. घडलेल्या अनपेक्षित प्रसंगामुळे अवचितपणे त्याच्याकडून अटीचा भंग झाला. त्यानंतर एक मोठा आवाज होऊन ही गुहादेखील लुप्त झाली. त्या वेळी उठलेल्या खुणा म्हणजे तेथे असलेल्या चित्रविचित्र खुणा अशी ती गमतीशीर आख्यायिका होता.

बोलता बोलता चित्रपरिसरात पोहोचलो. काही रेषा कातळावर वाहून आलेल्या मातीखाली आपले अस्तित्व दाखवत होत्या. साफसफाई केल्यावर चित्रे स्पष्ट झाली. या चित्रांमध्ये गवा रेडा, हत्ती, डुक्कर, मगर अशा विविध प्राण्यांचा समूह आहे. या सगळ्या रचना जणू काही एकमेकांत गुंतल्या होत्या. त्यामुळे व्यवस्थित पाहिल्याशिवाय या रचना नक्की काय आहेत, हे समजणे जरा अवघडच. कदाचित याच बाबीमुळे काही चित्रविचित्र रचना म्हणून आजपर्यंत त्यांच्याकडे पाहिले गेले. एकंदर रचना पाहून गुरव यांनीदेखील आश्चर्य व्यक्त केले. एवढी वर्षे येथे वावरूनदेखील या रचना नक्की काय आहेत, हे आम्हाला माहीत नव्हते, अशी कबुली त्यांनी दिली.

रत्नागिरी तालुक्यातील गावखडी गावातील सड्यावर (१०) दोन ठिकाणे आहेत. एका ठिकाणी एक मनुष्याकृती व त्यासोबत वराह आणि हरीण वर्गातील प्राण्यांच्या रचना आहेत. या रचना पाहण्यासाठी मात्र नजर तयारीची असणे गरजेचे आहे. दुसऱ्या ठिकाणी वाघ, मासा या रचनांसोबत काही प्राण्यांच्या पावलांचे ठसे व एक अनाकलनीय रचना असा समूह मिळाला. या दुसऱ्या ठिकाणाला रेडे पावलाचा सडा म्हणून ओळखले जाते.

या गावातील रहिवासी डॉ. गजानन रानडे यांनी एक आख्यायिका सांगितली. गावखडी गावाची देवी आणि शेजारील कशेळी गावाची देवी या दोघी एकमेकांच्या सख्ख्या मैत्रिणी. या दोघींमध्ये काही कारणाने वितुष्ट आले. त्याचे पर्यवसान भांडणात झाले. गावखडी देवीचे वाहन रेडा आणि कशेळी देवीचे वाहन वाघ. या दोघांमध्ये जोराची मारामारी झाली. या भांडणात जी देवी हरेल, त्या देवीने दुसऱ्या देवीच्या अंगणात कायम पाणी भरायचे, अशी अट आपापसांत ठरली. भांडणात कशेळी देवीचा पराभव झाला. या भांडणाच्या दरम्यान रेडा व वाघाच्या पावलाचे ठसे उमटले, ते म्हणजे चित्रपरिसरात दिसणारे पावलांचे ठसे. ठरल्या अटीप्रमाणे कशेळी देवीने पाणी भरायचे होते. गावखडीच्या गुरववाडीमध्ये बारमाही जिवंत पाण्याचा एक झरा आहे. हा झरा म्हणजे कशेळी देवी पाणी भरते, असे म्हटले जाते. हीदेखील एक वेगळीच आख्यायिका.

एव्हाना आमच्याकडे पुरेशी माहिती गोळा होऊ लागली होती. शोधातून मिळालेल्या चित्ररचनांची छायाचित्रे आमच्याकडे होती. लोकांशी संवाद साधताना ही छायाचित्रे आम्ही दाखवू लागलो. असे काही बघितले आहे का, हे विचारणे सोयीचे जात होते. त्यात राजापूर तालुक्यात (११) साखरकोंबे गावाचा संदर्भ हाती लागला. गावात केलेल्या चौकशीतून काहीच हाती लागत नव्हते. एक दिवस अचानक त्या गावातील लहान शाळकरी मुलांची गाठ पडली. गावातील लोकांबरोबर चाललेला संवाद त्या मुलांच्या कानावर पडला. आम्ही दाखवलेली छायाचित्रे त्यांनी पाहिली आणि मुलांनी त्यांच्याबरोबर चलण्याचा आग्रह धरला. लहान मुलांमधील निरीक्षण करण्याच्या उपजत वृत्तीतून त्यांच्या नकळत आपल्याला काही वेगळी माहिती मिळून जाते, याचा अनुभव आम्हाला आमच्या निसर्गभ्रमंतीमध्ये वेळोवेळी आला होता. त्यामुळे त्यांचा आग्रह न मोडता आम्ही त्यांच्याबरोबर निघालो. सुमारे एक ते दीड किलोमीटर चालल्यावर त्यांच्या शाळेच्या मागच्या बाजूला थोडे दूर पोहोचलो. त्यांनी पुरवलेली माहिती अचूक होती. शाळेतील मुले धड रस्त्याने जातील तर शपथ, असे म्हणायची पद्धत आहे. वेड्यावाकड्या रस्त्याने शाळा गाठायची. या वेड्यावाकड्या मार्गावरील ही चित्रे. या ठिकाणाचा आमच्या शोधाचा दुसरा टप्पा शाळेतील शिक्षकांनी केलेल्या विनंतीनुसार शाळेची सुट्टी संपल्यानंतर घेण्यात आला.

शोधाच्या दुसऱ्या टप्प्यात त्या शाळेतील मुलांसह शिक्षकदेखील सहभागी झाले. तीन-चार ठिकाणी विभागलेला हा परिसर. या परिसरात मोठ्या चित्ररचनांचे प्रमाण खूप आहे. काही चित्ररचना शोधणे म्हणजे सुतावरून स्वर्ग गाठण्यासारखे होते. जेमतेम काही इंच दिसणारी रचना साफ केल्यावर तब्बल २४ फूट लांब व तेवढी रुंद अशी ही भली थोरली. एकंदर ३०-३५ चित्ररचनांचा हा तीन-चार ठिकाणी विभागलेला परिसर, जिथे मोठ्या माणसांना आपल्या गावात काय आहे हे माहिती नाही, तिथे लहान मुलांच्या उपजत निरीक्षणवृत्तीतून पुढे आलेला. असाच अनुभव आम्हाला पुढे आणखी एका ठिकाणी आला.


आडिवऱ्यानजीक (१२) रुढे गावाच्या सड्यावर काही चित्रे आहेत. दोन-तीन फूट लांबी-रुंदीचे काही तरी आहे, एवढ्या माहितीवर प्रवास सुरू झाला. प्रत्यक्षात त्या ठिकाणी अत्यंत आगळीवेगळी आणि भलीथोरली रचना मिळाली. एखादे यंत्र असावे, अशी तब्बल २२ फूट लांब व २२ फूट रुंद अशी उठावाची भौमितिक रचना. या रचनेच्या लगत वाघ, देवमासा वगैरे रचनेसह मातृदेवता असावी अशी रचना मिळाली.

या चित्ररचना शोधत असताना एका अनाहूत व्यक्तीने दिलेल्या माहितीनुसार याच सड्यावर आणखी दोन ठिकाणे मिळाली. एके ठिकाणी विविध प्राण्यांच्या सुमारे ३० चित्रांचा समूह मिळाला. दुसऱ्या ठिकाणी तब्बल ९.६ फूट लांबीच्या मनुष्याकृतीसह प्राणी, गोपद्म यांचा समूह मिळाला. संबंधित जागामालकासह आजूबाजूच्या गावांतील जवळपास सर्वच लोकांना आपल्या येथे असे काही आहे, याची माहिती नव्हती. पुढे काही दिवस औत्सुक्यापोटी ही मंडळी सड्यावर या चित्ररचना पाहण्यासाठी जात होती, हे विशेष.

निनाद तेंडुलकर यांनी लांजा तालुक्यातील भडे गावात काही चित्रे असल्याचा संदर्भ दिला. (१३). या गावात दोन-तीन वेगवेगळ्या ठिकाणी चित्ररचना आहेत. एके ठिकाणी तब्बल १४.६ फूट लांबीची मनुष्याकृती कोरलेली आहे. या मनुष्याकृतीला खवण्या किंवा खवळोबा म्हणून ओळखले जाते. कुठली तरी दैवी शक्ती या परिसरात आहे, असे स्थानिक लोकांचे सांगणे आहे. यातूनच या परिसरातील गडग्याचे (कम्पाउंड वॉल) काम अर्थवट सोडून दिले आहे. श्रद्धा म्हणा किंवा अंधश्रद्धा, त्यामुळे येथील काही रचना नष्ट होण्यावाचून वाचल्या हे विशेष. या ठिकाणी आमचे काम चालू असताना एका अनाहूत व्यक्तीने आणखी माहिती पुरविली आणि अधिक चौकशी करण्याच्या अगोदर निघूनही गेली. (१४) हे ठिकाण होते लावगण गावाच्या हद्दीत. तिथे सात-आठ रचना आहेत. तिथेदेखील निवळीसारखी मोठी भौमितिक रचना आहे. या रचनेतील वेगळेपणाकडे आमचे लक्ष वेधले गेले. यातून आमचा सर्व चित्ररचनांचा तौलनिक अभ्यास सुरू झाला. याच वेळी आम्ही परत एकदा खूप पूर्वीपासून पाहत आलेल्या (१५) निवळी, व रामरोड या ठिकाणी भेट दिली. निवळी येथे चौकोनी आकाराची उठावाची भौमितिक रचना आहे. हे चित्र अर्धेअधिक शेजारील मार्गाखाली नष्ट झाले आहे. (१६) रामरोड येथे पाच चित्ररचनांचा समूह आहे. यात मनुष्याकृतीसह दोन प्राणी आणि एका पक्ष्याची रचना आहे. रामरोड येथील चित्रपरिसर जागामालकाने आपल्या परीने जपला आहे. एका आख्यायिकेतून या परिसराला चोर कट्टा असे म्हणतात. एकदा गावात मोठी चोरी झाली. चोराने चोरीचा माल घेऊन पोबारा केला. गावाच्या महापुरुषाने चोराला अडवले व त्यांच्यात मारामारी झाली. महापुरुषाने त्या चोराला उचलून आपटले. तो चोर जमिनीत गाडला गेला. त्या चोराचा उमटलेला ठसा म्हणजे येथे असलेली मनुष्याकृती. या मनुष्याकृतीची एकंदर ठेवण परग्रहवासी असावा अशी आहे.

चित्ररचनांचा शोध घेतल्यावर मिळालेल्या माहितीचे संकलन, वर्गीकरण चालू होते. त्यातून असे लक्षात आले, की मिळालेल्या रचनांमधील प्राण्यांच्या रचना या वास्तवातील त्या प्राण्यांच्या आकाराशी मिळत्याजुळत्या आहेत. पक्षी या प्रकारातील काही रचना आकाराने खूपच भव्यदिव्य अशा आहेत. मनुष्याकृतींमध्ये वैविध्य आहे. भौमितिक रचनेतील आकारांमध्ये आणि विषयांमध्ये मोठ्या प्रमाणात वेगळेपण आहे. प्राणी, पक्षी, भौमितिक रचना, मनुष्याकृती या सर्व रचना खोदून निर्माण केलेल्या, रेषेने केलेल्या आहेत. भौमितिक रचनांचे आकलन होत नसले, तरी बाकी रचनांमधून ते चित्र नक्की कोणत्या प्राण्याचे, पक्ष्यांचे आहे, याचे आकलन नेटक्या पद्धतीने होते. मोठ्या चौकोनी आकाराच्या उठावाच्या भौमितिक रचना आणि त्यांच्या आजूबाजूला सापडणाऱ्या ढोपरापासून खाली पायाच्या रचना आपले वेगळेपण दाखवून देणाऱ्या अशा आहेत.

पूर्वीपासून ज्ञात रचना आणि हाती आलेल्या रचना यात असलेला फरक आणि वैविध्य तज्ज्ञ मंडळींच्या निदर्शनास आणले. त्यांनी आश्चर्य व्यक्त केले. चित्रांचा आकार, त्यातील वैविध्य, त्यांचा पसारा या गोष्टी त्यांच्यासाठीदेखील नवलाच्या होत्या. अर्थात त्यांच्याकडून अधिक माहिती मिळणे कठीण झाले हे मात्र नक्की.

जे आहे ते आगळेवेगळे आहे, पुरातन आहे हे मात्र निश्चित होते. म्हणून पुरातत्त्व ख्यात्याकडे धाव घेतली. त्या ठिकाणी भा. वि. कुलकर्णी हे अधिकारी होते. परंतु ‘हा माझा विषय नाही. त्यामुळे मी याबाबत काही माहिती देऊ शकत नाही,’ असे ते म्हणाले. आमची निराशा झाली; पण त्या प्रसंगातून या विषयाचा अधिक खोलवर अभ्यास करण्याची प्रेरणा मिळाली. तेथून सुरू झाला चित्ररचना शोधाबरोबर त्यांच्या निर्मात्याचा शोध.

शोध घेत असताना चित्ररचनांना असलेल्या धोक्यांबाबतदेखील अंदाज आला. पर्यटनाच्या अंगानेदेखील याचे महत्त्व, वेगळेपण आमच्या लक्षात आले. अभ्यास हा न संपणारा विषय आहे; पण त्यासाठी या गोष्टी टिकणे गरजेचे आहे. या विचारातून जिल्हाधिकाऱ्यांकडे धाव घेतली. सविस्तर माहितीवजा निवेदन त्यांना सादर केले. यासाठी जिल्हा पोलीस अधीक्षक शिंदे सर यांची मोलाची मदत मिळाली. जिल्हाधिकारी राधाकृष्णन यांनीदेखील सकारात्मक साथ दिली.
राजापूर विधानसभा मतदारसंघाचे आमदार राजन साळवी यांनादेखील हा विषय सांगितला. त्यांनी त्याला प्रतिसाद देऊन राजापूरच्या प्रांताधिकारी कार्यालयात तेथील अधिकारी व नागरिक यांच्याबरोबर एकत्रित बैठकीचे आयोजन केले. या बैठकीचे फलित म्हणजे राजापूरचे प्रांताधिकारी सुशांत खांडेकर, पुढे त्यांचे मिळालेले सहकार्य अप्रतिम असेच. आमच्या शोधकार्यासाठी आता आम्हाला रत्नागिरीच्या तीन सक्षम अधिकाऱ्यांची साथ लाभली होती.

एका बाजूला याविषयी अभ्यास करण्यासाठी इंटरनेटच्या माध्यमातून शोध सुरू झाला, तर दुसऱ्या बाजूला या विषयातील माहीतगार व्यक्तींचा शोध. त्याचबरोबर शोधादरम्यान मिळालेल्या ठिकाणांचा नकाशा तयार केला. त्या नकाशावरून एक आकृतिबंध तयार केला. इंटरनेटच्या माध्यमातून हाती माहिती मिळत होती; पण कोकणाशी संबंधित अगदीच त्रोटक माहिती उपलब्ध झाली. त्यात सिंधुदुर्ग जिल्ह्यात कुडोपी येथे असलेल्या चित्ररचना कळल्या. त्या चित्ररचनांवर सतीश लळीत यांनी काम केले असल्याचे निदर्शनास आले. त्यांच्याशी संपर्क साधून त्यांच्याकडून अधिक माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न केला; पण रत्नागिरी जिल्ह्यातील निवळी येथे असलेल्या रचनेपलीकडे आणखी काही माहिती मिळाली नाही. कुडोपी येथील रचना नवाश्मयुगीन कालखंडातील असाव्यात, असे मत त्यांनी त्यांच्या शोधनिबंधात नमूद केले आहे. गोवा राज्यात कुशावती नदीच्या किनाऱ्यावरदेखील अशा रचना असल्याचे इंटरनेटच्या माध्यमातून लक्षात आले.

एकीकडे अभ्यास चालू असताना नवीन ठिकाणांचे शोधकार्यदेखील चालू होते. ‘टिक्याच्या (ता. रत्नागिरी) कातळावर काही तरी आहे,’ एवढ्या संदर्भावर शोध सुरू झाला. गावात चौकशी करण्यासाठी गेलो असता एके ठिकाणी काही व्यक्ती भेटल्या. त्यांच्याबरोबर गप्पा मारताना आणखी एका ठिकाणाची माहिती समोर आली. (१७) हे ठिकाण होते उमरे गावाच्या सड्यावर. त्यांच्यातील माहिती देणाऱ्या व्यक्तीला त्याच्या वडिलांनी असे काही असल्याचे सांगितल्याचे आठवत होते. ‘हुमा बिलाच्या जवळ लावा तेम्बाच्या पलीकडे सातविनीच्या पल्याड’ असा हा संदर्भ. या संदर्भाच्या आधारे थोड्या शोधकार्यानंतर चित्ररचना मिळाल्या, ठिकाण निश्चित झाले. पहिला टप्पा पार पडला. परतीच्या वाटेवर सोबतची व्यक्ती सहेतुक आपल्यासोबत वावरत असल्याचा अंदाज आला. त्याचा खिसा गरम करून आणि ‘काही मिळाले तर कळवा’ असे सांगून निरोप घेतला. आमच्या एवढ्या प्रवासात अनुभवलेला हा असा पहिलाच प्रसंग.

या परिसरात तब्बल २४ चित्ररचनांचा समूह आढळून आला. यातील विशेष चित्र म्हणजे शार्क माश्याचे चित्र. गंमत म्हणजे ज्या ठिकाणाचा संदर्भ घेऊन पोहोचलो होतो, ते ठिकाण आजतागायत मिळालेले नाही.

निवळी गावडेवाडी येथे काही तरी आहे, अशी माहिती पुढे आली. (१८) गावडेवाडी परिसरात पोहोचलो, तेव्हा हा सर्व परिसर चिऱ्याच्या खाणींनी व्यापला आहे, हे निदर्शनास आले. थोडी माहिती घेण्याच्या प्रयत्नात एका वृद्ध माणसाची गाठ पडली. त्या व्यक्तीने शिल्लक चित्ररचना दाखवल्या. या रचनांमध्ये मोठी चौकोनी आकाराची उठावाची भौमितिक रचना, मातृदेवतासदृश रचना आणि विशेष म्हणजे तब्बल १५ फूट लांबीचा सर्प यासह एक वर्तुळाकार रचना आहे.

सुदैवाने शेजारी चालू असलेल्या चिरा खाणीचा मालक तेथे आला. या चित्ररचनांना धक्का लावू नका अशी विनंती आम्ही त्यांना केली. त्यांनीही प्राथमिक होकार दर्शवला. परतीच्या वाटेवर त्या वृद्ध माणसाने खंत व्यक्त केली. ‘आम्ही अभ्यासक आहोत,’ असे सांगून काही मंडळी या ठिकाणी पूर्वी येऊन गेली असल्याची माहिती दिली. परंतु पुढे काय? हे जपले पाहिजे वगैरे गोष्टी सांगतात; पण त्यावर कोणीच काही करत नाही. ही चित्रे पण लवकरच नष्ट होतील. बाकीच्या चित्रांसारखी. असे सांगून ‘तुम्ही स्थानिक काही करणार का,’ असा प्रश्न आमच्यासमोर मांडून ठेवला.

‘पुढे काय?’ या प्रश्नाचे उत्तर खरोखरच या ठिकाणाने सोडवले. काही महिन्यांनंतर या ठिकाणी काही पर्यटकांसोबत आलो असता चिरा खाणमालकाने आपला शब्द पाळला नसल्याचे लक्षात आले. चित्ररचनांपासून अगदी जवळ चिरा खाणीचे काम सुरू करण्यात आले होते. लगेच हा विषय जिल्हाधिकारी राधाकृष्णन यांच्याकडे पोहोचवला. त्यांनी तातडीने कारवाई करून खाणीचे काम बंद केले. तसेच अन्य कोठे असा प्रकार आढळून आला, तर संबंधित काम बंद करण्याच्या सूचना संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या. तसेच संबंधित कातळचित्रे ‘सात-बारा’वर नोंद करता येतील का, या दृष्टीने विचार करून, त्या ठिकाणची महसुली कागदपत्रे गोळा करण्याबाबतदेखील सूचना दिल्या. त्यामुळे कातळचित्र संरक्षणासाठी एक आश्वासक सुरुवात झाली.

येथे मिळालेल्या माहितीनुसार काही अभ्यासक भेट देऊन गेल्याचे पुढे आले. योगायोग कसा असतो… त्याचदरम्यान ‘जे. जे. स्कूल ऑफ आर्ट’चे प्राध्यापक मराठे यांची गाठ पडली. कला या दृष्टीने विचार केल्यास आढळलेली चित्रे, ती कोरण्याची पद्धती प्राथमिक अवस्थेत असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले आणि पुण्याच्या डेक्कन महाविद्यालयातील प्राध्यापक डॉ. श्रीकांत प्रधान यांचा संदर्भ दिला. त्यांना संपर्क साधून अधिक माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न केला. डॉ. अशोक मराठे, प्रधान सर व सुबोध शिवलकर ही टीम कोकणातील प्राचीन बंदरे या विषयावर काम करत असताना त्यांना एक-दोन ठिकाणी चित्ररचना आढळलेल्या होत्या. त्यांच्या बोलण्यातून व त्यांच्या प्रसिद्ध झालेल्या लेखातून पालशेत, निवळी व देवीहसोळ या ठिकाणांचा उल्लेख समोर आला.

गोगटे-जोगळेकर महाविद्यालयाची विद्यार्थिनी शुभांगी कोत्रे हिने कापडगावात चित्रे असल्याची माहिती दिली. आमच्या शोधात प्रत्येक ठिकाणी काही ना काही वेगळी रचना समोर येत होती. (१९) कापडगावातदेखील वेगळी रचना समोर आली. थोड्या वेगळ्या शैलीतील सुमारे १४ चित्ररचनांचा समूह या ठिकाणी आहे. येथे असलेले समुद्री कासवाचे चित्र आमच्या विचारांना वेगळी दिशा देऊन गेले. या चित्ररचनांपासून सुमारे एक किलोमीटर अंतरावर असलेल्या एका ठिकाणाला भुताचा सडा म्हणतात. लांबलचक पसरलेल्या सड्यावर मध्येच एक भाग काहीसा वेगळा आहे. गवताची एक काडीदेखील इथे उगवत नाही. ‘या भागावर भुताने घाण करून कुल्ले घासले. म्हणून या भागात काही उगवत नाही,’ अशी गावातील लोकांची धारणा आहे. विस्तीर्ण कातळसड्यावर काही भागात गवताची एक काडीदेखील उगवू नये, ही खरेच नवलाची गोष्ट आहे.


राजापूर तालुक्यात (२०) सोगमवाडी येथील चित्ररचना शोधत असताना त्या गावातील एका माणसाची मदत घेतली. त्याने त्यांचे देव जिथे पूजतात, त्या ठिकाणाचे दर्शनदेखील घडवून आणले. लेणे असावे असे हे डोंगराच्या एका कपारीत असलेले स्थान. याच्या बाजूला पाण्याचा एक ओढा आहे. या पाण्याच्या साठ्याला हे लोक देव मानतात आणि पूजा करतात. (२१) आडिवरे गावाजवळ कोंडसर खुर्द येथील रचनांमध्ये माकडाच्या रचनांचा समावेश आहे. याच पठारावर दुसऱ्या टोकाकडे असलेल्या (२२) राजवाडी वाडीखुर्दच्या सड्यावरील चित्रपरिसर शोधण्यासाठी गावाच्या माजी सरपंचांची मदत झाली. प्रत्येक ठिकाणी मिळणाऱ्या चित्रांमध्ये एखादे चित्र नेहमी नवीन कोडे निर्माण करत होते. इथेही तोच प्रकार. प्राण्याच्या पोटात मनुष्याकृती कोरल्याचे इथे आढळून आले. या परिसरात सात-आठ चित्ररचना आढळून आल्या. तेथील कथा अजून वेगळी. शेजारी चालू असलेल्या चिरा खाणीच्या परिसरात आणखी काही रचना आहेत हे नंतरच्या कालावधीत पुढे आले. राजापूरचे प्रांताधिकारी खांडेकर यांनी तातडीने लक्ष घालून ही चिरा खाण बंद केली. खांडेकर हे एक वेगळे व्यक्तिमत्त्व. राजापुरातील पर्यटनवाढीसाठी त्यांनी स्वतःहून पुढाकार घेतला. त्यांच्या पुढाकारातून नवदुर्गा दर्शन या वेगळ्या पर्यटनपूरक ट्रिपचे आयोजन करण्यात आले होते. अशा प्रकारचा कोकणातील हा पहिलाच पर्यटनप्रयोग होता. खांडेकरांनी कातळचित्रांबाबत त्यांच्या क्षेत्रात आढळून आलेल्या चित्रठिकाणांची कागदपत्रे गोळा करून कातळचित्रांची नोंद सात-बारा दप्तरी व्हावी, यासाठी प्रस्ताव तयार करून जिल्हाधिकाऱ्यांच्या मंजुरीसाठी पाठवून दिला. त्यांचे संपूर्ण सहकार्य आम्हाला वेळोवेळी लाभले.

पावसामुळे प्रत्यक्ष शोधाच्या प्रवासाला थोडी खीळ बसली. या कालावधीत चित्रांचे वर्गीकरण, मिळालेल्या ठिकाणांचा अक्षांश- रेखांशांच्या साह्याने एकत्रित नकाशा तयार केला. तज्ज्ञ लोकांकडून मिळालेली माहिती, या अगोदर काही ठिकाणांबाबत प्रसिद्ध झालेली माहिती याबाबत साकल्याने विचार झाला. ठाकूरदेसाई सरांमुळे एकंदर भौगोलिक रचनेचा अभ्यास करता आला. चित्रांच्या वर्गीकरणाच्या वेळी प्राणिशास्त्रातील मित्रांची मदत घेतली. त्यातून रचनेतील प्राणी नक्की कोणते हे जाणून घेणे शक्य झाले. त्यातून चित्ररचनेमध्ये मिळालेले सर्व प्राणी हे जंगलातील (वाइल्ड) आहेत, यावर शिक्कामोर्तब झाले. निवळी येथील मोठ्या चौकोनी आकाराच्या भौमितिक रचनांसारख्या रचना अन्यत्रही आढळून आल्या. त्या रचना प्रथमदर्शनी सारख्या दिसत असल्या, तरी त्यात खूप फरक आहे. आजपर्यंत मिळालेल्या संदर्भानुसार, यापूर्वी फक्त निवळी, देवीहसोळ, उमरे व बारसू याच ठिकाणी तज्ज्ञ लोकांनी भेटी दिल्या असल्याचे आढळून आले. त्यातून त्यांनी काढलेल्या अंदाजांचा पुरेसा मेळ आमच्या शोधात आढळलेल्या रचनांशी होत नसल्याचेदेखील लक्षात आले. उदा. बारसूच्या सड्यावर ज्या चित्ररचनेला तज्ज्ञ लोकांनी भेट दिली आहे, त्यांनी तिथे असलेल्या एका रचनेला दिशादर्शक चिन्ह असे संबोधले आहे. प्रत्यक्षात ते दिशादर्शक चिन्ह नसून, ती वाघळी माशाची चित्ररचना आहे.

एकंदर चित्ररचनांच्या ठिकाणचा पसारा लक्षात आला. त्यावरून आणखी कोठे चित्ररचना असू शकतील, याचा अंदाज बांधून चौकशी सुरू केली. मिळालेली माहिती कार्यक्रम, छायाचित्र प्रदर्शन या माध्यमातून लोकांपर्यंत घेऊन जाऊ लागलो. वेगवेगळ्या माध्यमांतून अधिकाधिक माहिती गोळा करण्याचा प्रयत्न चालूच होता. आलेल्या अनुभवांतून शोधपद्धतीतदेखील थोडा बदल केला. सरकारदरबारी थोडा अधिक प्रयत्न चालू केला. पुढे येत असलेल्या माहितीतून भारतात अन्यत्र असलेल्या अशा प्रकारच्या चित्ररचनांपेक्षा वेगळ्या रचना, त्यांची निर्मितीची पद्धत यातील फरक स्पष्ट होऊ लागले. वृत्तपत्रे, शाळा, महाविद्यालये, वेगवेगळ्या संस्था यामध्ये केलेल्या कार्यक्रमांतून कातळ-खोद-चित्रे हा शब्द सर्वांपर्यंत पोहोचला. नाही म्हटले तरी काही प्रमाणात जागरूकता निर्माण करण्याच्या आमच्या प्रयत्नांना यश आले.

पाऊस कमी होताच शोधमोहिमेच्या पद्धतीत केलेल्या बदलानुसार चौकशी सुरू झाली. (२३) गणपतीपुळे रस्त्यावरील चवे-देऊड या गावाच्या सड्यावर चित्रे असावीत, असा आमचा अंदाज त्याच गावच्या विलास काळेंकडे बोलून दाखवला. त्याला त्यांनी प्रतिसाद देऊन माहिती घेतली आणि खरोखरच त्या गावाच्या सड्यावर चित्रे असल्याचे निश्चित झाले. या ठिकाणी १४-१५ चित्ररचनांचा समूह आहे. यातील १८ फूट लांबीची एकशिंगी गेंड्याची चित्ररचना आमच्या विचारांना वेगळी दिशा देऊन गेली. एकशिंगी गेंड्याचे वास्तव्य सध्या अखंड जगात फक्त आसाममध्ये आहे. मग त्याची चित्ररचना इथे कशी काय? अद्याप कोकणात त्याच्या अस्तित्वाचे पुरावे नाहीत.

(२४) परचुरी गावाच्या सड्यावर १५-१६ चित्ररचनांच्या ठिकाणी एक आख्यायिका ऐकायला मिळते. मुलीच्या लग्नाचे संपूर्ण वऱ्हाड कोवळ्या कातळात बुडाले. त्यांच्या उमटलेल्या खुणा म्हणजे इथली कातळचित्रे. चित्ररचनांमध्ये दिसणाऱ्या आकारांना ‘ही दागिन्याची पेटी, हातातला नारळ,’ वगैरे पद्धतीने वृद्ध मंडळींकडून ओळखले किंवा सांगितले जाते.

इथल्या आख्यायिकेने आम्हाला नक्कीच विचारात टाकले. कातळात एखादी गोष्ट कशी काय गाडली जाऊ शकेल. कोवळा कातळ म्हणजे काय? मग प्रवास सुरू झाला आख्यायिका उलगडण्याचा. कोकणात कातळ सर्वत्र असला, तरी त्याच्या काठिण्यात फरक आहे. कोठे तो फार कडक आहे, तर कोठे नरम. याला या कातळाच्या निर्मितीमागील प्रक्रिया कारणीभूत आहे. जेथे कोवळ्या कातळात वऱ्हाड बुडाले, ही आख्यायिका ऐकायला मिळते, तिथे असलेला कातळ नरम आहे. मग अशा बुडणे, गाडणे अशी आख्यायिका असलेल्या ठिकाणची भौगोलिक परिस्थिती परत एकदा नजरेखालून घातली. आणि अशा प्रकारच्या आख्यायिकांमागील गर्भितार्थ उलगडला. या चित्ररचना आणि आख्यायिका यांचा कोणताच संदर्भ एकमेकांशी नाही. कातळसड्यावर काहीशा गूढ वाटणाऱ्या या रचना पाहून त्याभोवती वेगवेगळ्या आख्यायिका गुंफल्या गेल्या; पण या आख्यायिकांतून तेथील भौगोलिक परिस्थिती काय असावी, याची माहिती मिळते.

परचुरीच्या या सड्यावर असताना आमची एका हरहुन्नरी व्यक्तीशी गाठ पडली. ती व्यक्ती अनोळखी तर नव्हतीच. आमचा चांगला मित्र मिलिंद खानविलकर. उक्षी ग्रामपंचायतीच्या सरपंचपदाचा भार सध्या या व्यक्तीच्या खांद्यावर आहे. आम्ही त्याला सूचना केली, ‘तुमच्या गावाच्या सड्यावरदेखील अशा रचना आहेत. एकत्र शोध घेऊ.’ उक्षी गावाचा सडा परचुरी, करबुडे, जांभरुण यांच्या मधला. या सर्व ठिकाणी चित्ररचना आहेत. (२५) जांभरुण गावाच्या सड्यावर तब्बल ४२ चित्ररचनांचा समूह आहे. वेगवेगळ्या आकाराच्या आणि शैलीच्या मनुष्याकृती हे या ठिकाणचे वैशिष्ट्य. या परिसराला राक्षसाची जाल असे म्हणतात.

करबुडे, जांभरुण, परचुरी येथील माहिती मिलिंदला दिली. रचना कशा शोधायच्या, याची कल्पना त्याला दिली. खरेच अत्यंत उत्साही अशा मिलिंदचा दोन दिवसांतच निरोप आला. (२६) उक्षी गावाच्या सड्यावर चार-पाच ठिकाणी मिळून सुमारे चाळीसेक चित्ररचना या ठिकाणी आहेत. एके ठिकाणी फक्त लहान-मोठ्या भौमितिक रचना आहेत. दुसऱ्या ठिकाणी असलेली चित्ररचना लक्षवेधक आहे. तब्बल १८ फूट लांब व तेवढी रुंद अशी हत्तीची रचना.

मधल्या कालखंडात आमचे सरकारदप्तरी प्रयत्न चालूच होते. रत्नागिरी जिल्हा परिषदेच्या तत्कालीन मुख्य कार्यकारी अधिकारी प्रेरणा देशभ्रतार यांनी आमच्या कामाचे महत्त्व ओळखून, ग्रामीण पर्यटन विकास योजनेमध्ये कातळचित्रांच्या ठिकाणांचा समावेश केला आणि आपल्या परीने संपूर्ण मदत देऊ करण्याचा प्रयत्न केला. तसे पाहता वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून आम्हाला मिळत असलेले सहकार्य वादातीत होते. अशी दुर्मीळ उदाहरणे असतात. त्यात आम्ही एक होतो.

देशभ्रतार यांनी घेतलेला पुढाकार सर्वांपर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न केला. त्याला उक्षीचे सरपंच मिलिंद यांनी खऱ्या अर्थाने चांगला प्रतिसाद दिला आणि कातळचित्राच्या ठिकाणाकडे जाण्याचा मार्ग करून घेतला.

दरम्यानच्या काळात आमच्या पाठी उभ्या असलेल्या या तिन्ही वरिष्ठ अधिकाऱ्यांची बदली झाली. अर्थात सरकारदरबारी नवा गडी नवे राज्य सुरू झाले. ते प्रयत्न एका बाजूला चालू असताना दुसरीकडे शोधकार्य चालूच होते.

प्र. के. घाणेकर यांच्यामुळे ‘महाराष्ट्र अनलिमिटेड’ या अंकातून लेख प्रसिद्ध झाला. आशुतोष बापट यांची सरांमुळे ओळख झाली. त्यांची मदत सातत्याने होत होती आणि आहेही.

एका बाजूला अप्रतिम सहकार्य मिळत होते, तर काही प्रसंगी वाईट अनुभवदेखील पदरात पडत होते. इतिहास या विषयात अनेक वर्षे काम करणाऱ्या एका संस्थेने आमच्याकडून माहिती घेऊन वेगळी चूल मांडण्याचा प्रयत्न केला. काही जणांनी स्वतःच्या नावावर खपविण्याचा प्रयत्न चालविला. या गोष्टीचे नक्कीच वाईट वाटले. ज्ञानदानाच्या क्षेत्रातील या गोष्टीची खंत वाटली.

शोधात नवनवीन ठिकाणांची भर पडत होती. (२७) कोतापूर, (२८) शेडे, (२९) नाटे, (३०) विखारे गोठणे, (३१) जयगड, (३२) कुरतडे, (३३) मासेबाव, (३४) रावारी, (३५) हर्चे, (३६) भडे, (३७) बेनी, (३८) कोळंबे अशी विविध ठिकाणे. प्रत्येक ठिकाणची चित्रे वेगवेगळी. काही ना काही कोडे निर्माण करणारी आणि आख्यायिकांपासून दूर. या सर्व प्रवासात आलेल्या अनुभवातून मिळालेल्या सर्व ठिकाणांचा परत एकदा साकल्याने विचार केला. त्यातून चवे देऊड पंचक्रोशीत (३९) चवे गावी नवीन ठिकाण समोर आले. देवीहसोळ परिसरात अनेक चित्ररचना मिळाल्या. बारसूच्या सड्यावर आणखी खूप मोठा खजिना हाती लागला. यापूर्वी अभ्यासकांनी मांडलेली मते, गृहीतके यांचा नव्याने अभ्यास करणे गरजेचे आहे, हे आमच्या शोधकार्यात आलेल्या अनुभवातून स्पष्ट झाले आहे. बारसूच्या सड्यावर मिळालेल्या खजिन्याने ही गोष्ट अधोरेखित केली आहे.
कातळचित्रांच्या शोधाबरोबर आम्ही आडवळणावरचे कोकण जवळून अनुभवत होतो. जैवविविधतेतील वेगवेगळ्या घटकांची ओळख होत होती. पक्षी कुळातील वेगवेगळ्या प्रजातींची भर पडत होती. कास पठाराएवढे सौंदर्य कोकणातील या कातळसड्यांवर अनुभवायला मिळत होते. कोकणातील जैवसाखळीतील सर्वोच्च स्थानी असलेल्या बिबट्याचे दर्शन हे आमच्या दृष्टीने नेहमीचेच झाले.

गोवळ गावच्या टिपऱ्या, जैतापूर येथील खारवी समाजातील समई नृत्य, राजापुरातील शिमगोत्सवातील रोम्बाट ही आगळीवेगळी प्रथा, धनगर समाजातील गजा नावाचा नृत्यप्रकार, भडे गावातील निखाऱ्यावरून चालण्याची प्रथा, अशा वेगवेगळ्या गोष्टींच्या माध्यमातून कोकणची समृद्धी अलगद उलगडली जात होती.


उक्षीतील ग्रामस्थ आणि सरपंचांच्या पुढाकाराने झालेले कातळ-खोद-चित्राचे संरक्षण
शिंदे सरांचे शब्द अगदी खरे होते. कोकण विभागीय आयुक्त म्हणून डॉ. जगदीश पाटील यांची बदली झाली. त्यांना या विषयात विशेष रुची आहे. त्यांच्या येण्याने सरकारी पातळीवर काहीशा रेंगाळलेल्या विषयाला गती मिळाली. त्याचदरम्यान रत्नागिरीचे प्रांताधिकारी अमित शेडगे यांची गाठ पडली. त्यांच्याकडून लाभत असलेल्या मदतीबाबत सांगण्यास शब्द अपुरे पडतील. खरे सांगायचे झाले, तर ते आमच्या टीमचे एक सहकारी बनून गेले आहेत. योगायोग म्हणजे महाराष्ट्र पुरातत्त्व विभागाचे संचालक म्हणून तेजस गर्गे यांच्याकडे कारभार सोपविला गेला. गर्गे सर स्वतः पुरातत्त्व शास्त्रज्ञ. महाराष्ट्र राज्य शासनाच्या या विभागाला याच विषयातील व्यक्ती संचालक म्हणून तब्बल २२ वर्षांनी लाभली. आमच्या शोधाच्या दृष्टीने ही खूप महत्त्वपूर्ण अशी बाब. त्यांची गाठभेट झाली आणि कातळचित्र या विषयाला ‘बुलेट ट्रेन’ची गती मिळाली. कातळचित्रांच्या ठिकाणांना राज्य संरक्षित स्मारकाचा दर्जा मिळविण्यासाठी त्यांनी स्वतःहून पुढाकार घेतला आणि आजही ते सर्वतोपरी प्रयत्न करत आहेत.

मधल्या कालखंडात या विषयाकडे पर्यटकांचा ओघ वाढू लागला आहे. सरकारदरबारी ही चित्रठिकाणे संरक्षित करण्यात येणाऱ्या तांत्रिक अडचणींबाबत सातत्याने विचारविनिमय चालू आहे. त्यात अमित शेडगे यांच्याबरोबर लोकसहभागातून ठिकाणांचे संरक्षण करण्यासाठी पुढाकार घ्यावा, असे सूचित केले. त्याला त्यांनी प्रतिसाद दिला. याही वेळी मिलिंद खानविलकर उभे राहिले आणि बघता बघता लोकसहभागातून उक्षी येथील गजराज संरक्षित झाले. जागामालक, स्थानिक ग्रामस्थ यांना सरकारी अधिकाऱ्यांची साथ लाभली, तर काय होऊ शकते, याचे एक जिवंत उदाहरण उभे राहिले. चित्र संरक्षित झाल्यापासून अवघ्या काही महिन्यांत सुमारे सात हजारांहून अधिक पर्यटकांनी या ठिकाणी भेट दिली आहे. स्वाभाविकच त्याचा परिणाम स्थानिक व्यापारी वर्ग व जनतेला झाला आहे. अखंड महाराष्ट्रात प्रागैतिहासिक ठिकाण लोकसहभागातून संरक्षित झाल्याचे हे पहिलेच उदाहरण. हा मान उक्षी या लहानशा ग्रामपंचायतीने पटकावला. मिलिंद खानविलकर यांच्यासारखे सरपंच सर्वत्र लाभले तर कोकणाचा शाश्वत विकास होण्यास वेळ लागणार नाही.


कातळ चित्रांबरोबर आमचा मंदिरांवरही अभ्यास होत होता. मंदिरातील वेगवेगळ्या गोष्टी समोर येत होत्या. आज जगाच्या पाठीवर पोहोचलेले दशावतारी खेळे सर्वांना ज्ञात आहेत; पण कधीतरी लुप्त पावलेल्या या कलेला आडिवऱ्याच्या महाकाली मंदिरात पुनरुज्जीवन मिळाले आहे, हे कीती लोकांना ठाऊक आहे? गणेशगुळ्यातील लक्ष्मी- दामोदरची दुर्मिळ मूर्ती, गोवळमधील ब्रह्मदेवाची अत्यंत सुरेख मूर्ती, साटवलीमधील गुप्तकालीन विष्णूमूर्ती, अशी एक ना दोन… कोकणाचे वैभव असणारी ही मंदिरे.

मध्यंतरीच्या कालखंडात आणखी एक ठिकाण मिळाले. (४१) कशेळी. राजापूर तालुक्याच्या उत्तर टोकावर वसलेले हे गाव. या गावाच्या सड्यावर एका भल्या थोरल्या चित्ररचनेशी आमची गाठ पडली. ‘अबब’ हाच शब्द त्या रचनेला योग्य. सुमारे ५० फूट लांब व ४० फूट रुंदीची ही हत्तीची चित्ररचना. ही चित्रे नीटनेटकी पाहायची झाल्यास आपल्याला हवेत किमान ५० फूट जावे लागते. या रचनेमध्ये विविध प्राणी, पक्षी, जलचरही कोरलेले आहेत. तब्बल ८० चित्रांचा एकत्रित समूह. भारतातील या प्रकारातील एखाद्या प्राण्याचे हे सर्वांत मोठे चित्र. या परिसरात एकंदर १२५ चित्ररचना आहेत. आजपर्यंत आमच्या शोधात मिळालेला हा सर्वांत मोठा समूह. या चित्ररचनेने परत एकदा वेगळ्या विचारांना गती दिली.


चित्ररचनांना राज्य संरक्षित स्मारकांचा दर्जा देण्यासाठी आवश्यक बाबींची पूर्तता करण्यासाठी पुरातत्त्व विभागाकडून ऋत्विज आपटे यांची नेमणूक करण्यात आली. आपटे स्वतः पुरातत्त्व अभ्यासक. त्यांच्यासोबत महसूल खात्याच्या अधिकारीवर्गाबरोबर सर्व ठिकाणांचा एकत्रित सर्व्हे सुरू झाला. या सर्व्हेदरम्यान आपटे यांच्या ज्ञानाचा आम्हाला अधिक उपयोग झाला. तत्कालीन मानवाने वापरलेली दगडी हत्यारे आम्हाला मिळाली. कातळ-खोद-चित्रांच्या कालनिश्चितीसाठी थोडीफार का होईना, एक दिशा मिळाली.

या सर्व्हेदरम्यान माणसांच्या वेगवेगळ्या तऱ्हा पाहायला मिळाल्या. सर्व्हेवेळी उमरे गावात गेलो. त्या वेळी गावातील ४०-५० माणसे या ठिकाणी उपस्थित होते. त्यांचा विरोध होता. ‘आमची जागा आहे. आम्ही देणार नाही,’ वगैरे गोष्टींनी सुरुवात झाली. ती माणसे आम्ही सांगत असलेल्या गोष्टी ऐकून घेण्याच्या मनःस्थितीमध्ये नव्हती. ही चित्रे पुरातन नाहीत, असे त्यांचे सांगणे होते. त्यांच्याबरोबर झालेल्या संवादात त्यांच्याच बोलण्यातून ही चित्रे कोणी कधी निर्माण केली हे माहिती नसल्याचे निदर्शनास आणून दिले, तेव्हा कुठे राग थोडा शांत झाला. या चित्रांचे महत्त्व, त्यामुळे गावाला होणारा फायदा या बाबींची कल्पना दिली. कोकणी माणसाची टिपिकल ओळख ही मंडळी बाजूला ठेवतील अशी अपेक्षा. उक्षीचे उदाहरण सर्व लोकांनी समोर ठेवले, तर या चित्रांचे संरक्षण नक्कीच शक्य आहे. त्या दृष्टीने आमचे प्रयत्न चालूच आहेत.

शोधप्रवास आजही चालूच आहे. रत्नागिरी जिल्ह्यासोबत सिंधुदुर्ग जिल्ह्यातदेखील आमचा प्रवास सुरू झाला आहे. आजमितीस ५२ गावांतून सुमारे ९० ठिकाणी १२००हून अधिक कातळ-खोद-चित्ररचना शोधण्यास यश मिळाले आहे. खरे म्हणजे प्रत्येक ठिकाणावर एक स्वतंत्र लेख होईल.

या चित्ररचना का कोरल्या गेल्या? त्यामागील उद्देश काय? चित्ररचनेतील गेंडा, पाणघोडा हे प्राणी कधी काळी कोकणात अस्तिवात होते का? त्यांचा कालखंड कोणता? या रचना एकाच कालखंडात कोरलेल्या आहेत की वेगवेगळ्या? देव, धर्म, भाषा या गोष्टी त्या माणसाला माहिती होत्या का? मानवी उत्क्रांतीचे गूढ आणि अगम्य प्रश्न घेऊन ही कातळचित्रे आपणासमोर उभी आहेत.

कातळ-खोद-चित्रांमधील विविध रचना, त्यांचे आकार, शैली मिळालेली दगडी हत्यारे यांचा विचार करता या रचना निर्माण करणारा मानव भटका होता. अन्न मिळविण्यासाठी तो पूर्णपणे शिकारीवर अवलंबून होता. शेतीचे ज्ञान त्याला अवगत झाले नव्हते असे दिसते. यातून या रचना इसवी सन पूर्व १० हजार ते १२ हजार या कालखंडातील असाव्यात, असा अंदाज तज्ज्ञ लोकांनी व्यक्त केला आहे. अश्मयुगीन कालखंडातील या रचना भारताच्या प्रागैतिहासिक कालखंडावर नव्याने प्रकाश टाकण्यात महत्त्वपूर्ण ठरणार आहेत. अर्थात अधिक सखोल अभ्यासाची आणि अधिक पुराव्यांची गरज आहे. त्या दृष्टीने आमचा प्रवास चालू आहे.

एक महत्वाआहची बाब म्हणजे या शोधाची दखल बीबीसी, दी हिंदू, लाइव्ह इंडिया, हिस्टरी डॉट कॉम यांसारख्या जगातील अग्रगण्य प्रसारमाध्यमांनी घेतली आहे. त्यामुळे अन्य देशांतील तज्ज्ञ, पर्यटकही कोकणाकडे वळू लागले आहेत. कातळ-खोद-चित्रांचा शोध, संरक्षण व संवर्धन या आमच्या विषयाला आता योग्य बळ मिळू लागले आहे. आमचा हा प्रवास पूर्णपणे तन, मन, धन अर्पून चालू आहे. आजपर्यंत एक नया रुपयाचीही मदत संस्था, सरकार किंवा व्यक्ती अशा कोणाकडूनही मिळालेली नाही. हे मुद्दाम लिहायचे कारण, की महाराष्ट्र सरकारने २४ कोटी रुपयांची घोषणा केली आहे; पण ती फक्त घोषणा आहे. कोकणाच्या सांस्कृतिक व आंतरराष्ट्रीय पर्यटनाच्या दृष्टीने हा अमूल्य ठेवा जपण्यासाठी जपण्यासाठी सर्वांच्या साथीची गरज आहे.

कातळचित्रांच्या शोधात आम्हाला फक्त ती चित्रेच मिळाली, असे नव्हे, तर आडवळणावरील कोकणाचे खरेखुरे सुंदर रूप आमच्यासमोर उलगडले. माणसांच्या स्वभावांचे अंतरंग उलगडले, कातळचित्रे म्हणजे फक्त चित्रांचा अभ्यास नव्हे. तो अभ्यास आहे पुराशास्त्राचा, माणसाच्या उत्क्रांतीचा, भौगोलिक गोष्टींचा, जैवविविधतेतील वेगवेगळ्या घटकांचा. भौतिक आणि रसायनशास्त्राचा. म्हणूनच खऱ्या अर्थाने सर्वांगीण असा हा विषय आहे.

संपर्क : ९४२२३ ७२०२०, ९४२३२ ९७७३६

ई-मेल : bhairisbud@gmail.com

(साप्ताहिक कोकण मीडियाच्या २०१८च्या दिवाळी अंकात हा लेख प्रसिद्ध झाला होता.)

http://amolpalye.blogspot.com/2018/08/blog-post_27.html
कोकणातील गूढ कातळ-शिल्प
August 10, 2018

कोकणासारखा गुढ प्रदेश महाराष्ट्रात अन्यत्र कोठे नसेल. येथे रूढी- प्रथा, परंपरा आणि भुतं-खेतं अगदी देव-देवस्की, जारण-मारण यांचे जेवढे गुढ येथे आहे तेवढे गुढ कोठे आढळणे कठीण. या सार्‍या गुढांमागचे रहस्यही कोणाला अजून स्पष्ठपणे उलगडता आलेले नाही. कोकणात सध्या आणखी एक गुढ सध्या चर्चेेत आहे. ते म्हणजे कोकणातल्या जांभ्या दगडांवर कोरलेल्या कातळशिल्पांचे. कोणी कोरली असतील ही कातळशिल्प? का कोरली असतील? कधी कोरली असतील? काय असेल या कातळशिल्पांचा अर्थ? या सार्‍या प्रश्‍नांची उत्तरे सध्या तरी अनुत्तरीतच आहेत. ती उत्तरे शोधण्याचे स्तुत्य प्रयत्न अनेकांनी सुरू केले आहेत. कातळशिल्पांच्या गुढांमागचे रहस्य उलगडेल तेव्हा उलगडेल, पण त्याआधी आपल्याला त्या कातळशिल्पांचे जतन करणे अत्यंत गरजेचे आहे. कारण कोकणात जमिनीला सोन्याचा भाव आला आहे. कोकणवासियांनी आपल्या वहिवाटीच्या कातळावर गडगे घालून, कलमे लावून आणि चिरे खणी काढून ही कातळशिल्पे अज्ञानापोटी नष्ट करायला सुरूवात केली आहे. रत्नागिरी आणि सिंधूदुर्ग या दोन्ही जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात कातळ भाग आहे. या कातळभागावर अनेक गुढ आकृत्या आहेत. त्याच कातळशिल्पांविषयी थोडक्यात..
६००० वर्षे जुनी?राजापूरच्या कातळावर तब्बल चौदा चौरस किलोमीटर अंतरावर अनाकलनीय शिल्पे आढळली आहेत. मासे, जलकुंभ, जलसर्प अशा जलस्थानाशी निगडीत शिल्पाकृती या कातळांवर कोरलेल्या आहेत. कोकणातल्या जांभा दगडाच्या कातळावर आढळणारी शिल्प हे आजही एक मोठे गूढ आहे. विविध चित्रे आणि अगम्य अशा आकृत्या व नकाशांनी ही शिल्प समृद्ध आहेत. अनेक ठिकाणी रस्ता रुंदीकरणात किंवा नवीन इमारतींच्या बांधकामामुळे अशी दुर्मिळ शिल्पे गायब झाली आहेत. ही चित्रे, नकाशे आणि आकृत्या कोणी आणि कधी काढल्या असाव्यात याची नेमकी कालगणना आज तरी उपलब्ध नाही. काहींच्या मताप्रमाणे ही कातळ चित्रे इसवी सन पूर्व ६००० वर्षे जुनी असावीत.

विलक्षण अविष्कार
कोकणातील जांभा दगडाचा, विशेषतः कातळ रचनेचा अभ्यास करीत असताना असे आढळले की, इथल्या दुय्यम जांभा पठारावर ती प्रामुख्याने काढली गेली आहेत. देवगड आणि विजयदुर्ग येथील सडा हा जांभ्याचे आदर्श असे कातळ आहे असे मानण्यात येते. मात्र, रत्नागिरी जिल्ह्यातील राजापूर तालुक्यातला कातळ सडा हा निसर्गाचा एक विलक्षण आविष्कारच आहे. येथील कातळाची जाडी २५ मीटरपेक्षा जास्त असून, भूजल साठेही खूप खोल आहेत. राजापूरच्या कातळावर जुवाठी- उपळे- प्रिंदावण या त्रिकोणात उपळे गावाच्या सीमेवर आम्हाला चौदा चौरस किलोमीट कातळावर अनाकलनीय शिल्प आढळली आहेत. मासे, जलकुंभ, पाण्यातील साप अशा जलस्थानाशी निगडीत चित्रविचित्र शिल्पाकृती यावर काढल्या आहेत. मे महिन्यात कातळावरचे सगळे गवत नाहीसे झाल्यावर त्यावर जलस्थानांशी संबंधित आकार दिसतात, असे स्थानिक नागरिक सांगतात. शास्त्रीय पद्धतीने या प्रदेशातील कातळ चित्रांचा मागोवा घेणे गरजेचे आहे.

शोधनिबंधाद्वारे प्रसिध्दी
कर्नाटकातील बदामी येथे ‘रॉक आर्ट सोसायटी ऑफ इंडिया’ या संस्थेची सतरावी राष्ट्रीय कॉंग्रेस संपन्न झाली. राष्ट्रीय स्तरावरील या परिषदेमध्ये, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांचे जनसंपर्क अधिकारी सतीश लळीत यांनी एका शोध निबंधाद्वारे सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या मालवण तालुक्यातील हिवाळे आणि कुडोपी येथील कातळशिल्पांच्या सविस्तर माहितीचे छायाचित्रांसह सादरीकरण केले. स्वतः लळीत हे मूळचे सिंधुदुर्ग जिल्ह्याचे रहिवासी आहेत.

परस्पर संबध असावा?
या ठिकाणी असलेले मातृदेवतेचे शिल्प विशेष उल्लेखनीय आहे. हिवाळे येथील सड्यावरही अशाच कातळशिल्पांचा शोध लळीत व त्यांचे बंधु प्रा. डॉ. बाळकृष्ण लळीत यांनी २००२ मध्ये लावला होता. पश्‍चिम किनारपट्टीवर गोव्यातील उसगाळीमळ, महाराष्ट्र - गोवा सीमेवरील विर्डी, हिवाळे, कुडोपी, खानवली (राजापूर), निवळी (रत्नागिरी) अशा अनेक ठिकाणी ही कातळशिल्पे आढळली असून त्यामध्ये काही परस्परसंबंध (लिनिएज) असण्याची शक्यता लळीत यांनी आपल्या सादरीकरणाच्या वेळी व्यक्त केली.या परिषदेला देशभरातून जमलेल्या रॉक आर्ट क्षेत्रातील तज्ज्ञ, तसेच हौशी संशोधकांनी लळीत यांच्यासंशोधनाबद्दल आणि त्याच्या माध्यमातून महाराष्ट्रातील सिंधुदुर्ग जिल्हा प्रथमच रॉक आर्टच्या नकाशावर येत असल्याबद्दल संतोष प्रकट तर केलाच. पण, एवढ्या मोठ्या प्रमाणात प्रथमच जगासमोर आलेला आपल्या देशातील हा अनमोल खजिना जतन करुन त्याची नीट प्रसिद्धी केल्यास सिंधुदुर्ग, रत्नागिरी जिल्हा रॉक आर्टच्या जागतिक नकाशावरमानाचे स्थान पटकावेल, असा विश्‍वासही व्यक्त केला.निवळी फाट्यावर नकाशासिंधुदुर्गप्रमाणे कोकणातील ठाणे, रायगड आणि रत्नागिरी या अन्य जिल्ह्यातही विविध ठिकाणी जांभा पाषाणावरकोरलेली लक्षणीय अशी चित्रे, नकाशे, काष्ठ शिल्पे, गुहा, लेणी, मंदिरे आढळून येतात. मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर हातखंब्याच्या पुढे निवळी तिठ्याजवळ जांभा दगडावर कोरलेला एक भला मोठा पथदर्शक नकाशा हा कुतुहलाचा विषय होता. सध्या मात्र हा पथदर्शक नकाशा निदर्शनास येत नाही. बहुदा तो रस्ता रुंदीकरणाच्या कारणाने गायब केला गेला असावा. नव्या पिढीला या कोरीव नकाशाची फारशी माहिती देखील नाही. सदरनकाशा हा आंबा घाट, अणुस्कुरा घाट, गगनबावडा घाट, संगमेश्‍वर आदी ठिकाणाहून त्या काळात व्यापार -उदीमासाठी येणार्‍या व्यापार्‍यांना निश्‍चितच पथ- मार्गदर्शक ठरला असेल.


नाचण्यात नौकेच चित्र
रत्नागिरी जिल्ह्याच्या राजापूर तालुक्यात एकेकाळी बंदर असलेल्या बारसू या गावातील मोठ्या डोंगरावर असलेलीकोरीव चित्रे ऐतिहासिक अभ्यासकांना व संशोधकांना आजवर एक आव्हान ठरली आहेत. ही चित्रे प्रत्यक्ष पाहताना ती कोणत्या तरी धार्मिक कारणासाठी काढलेली असावीत असेच वाटते. मात्र ती चित्रे कोणी आणि कधी कोरली यासंदर्भातील शोध अद्यापही लागलेला नाही. रत्नागिरी नजिकच्या नाचणे या गावीही अशाच प्रकारचे जांभा दगडावर कोरलेले नौकेचे चित्र पहावयाला मिळते.शिलाहार काळाचा संदर्भरायगड जिल्ह्यात कान्हेरी, कुडेमांदाड, चौल गांधारपाले (महाड) तसेच रत्नागिरी जिल्ह्यातील पणदेरी, पन्हाळेकाझी, कोळकेवाडी, कळंबस्ते या ठिकाणची जीर्णावस्थेत असलेली लेणी हीसुध्दा बहुतांशी दुर्लक्षितच राहिलेली आहेत. कोकणात या व अशा अनेक लेण्यांची उभारणी इसवी सनापूर्वी २०० वर्षे आधी झाली असावी, असा अंदाज वर्तविला जातो. कोकणात बौध्द धर्माचा प्रसार व प्रचार करण्यासाठी गावोगावी फिरणारे बौध्दभिक्खू हे या लेण्यांचा वापर त्यांच्या वास्तव्यासाठी आणि साधनेसाठी करीत असावेत, असे अनुमान काढले गेलेआहे. नंतरच्या मध्ययुगीन काळात कोकणात दीर्घकाळ शिलाहार राजांनी राज्य केले. त्या कालखंडात कलेचा खर्‍या अर्थाने विकास व संरक्षण झाले, असे अभ्यासकांचे मत आहे.
शिलाहार राजांच्या कालावधीमध्ये विकसित झालेली कला व कलाकारांना मिळालेले आश्रयस्थान याची साक्ष म्हणजेच कसबा- संगमेश्‍वर येथील हेमाडपंथी श्री कर्णेश्‍वरमंदिर, हे होय . या संपूर्ण परिसरात लहानमोठी सुमारे ३६० मंदिरे आढळून येतात. म्हणूनच या ठिकाणालापूर्वीच्या काळी दक्षिण काशी असेही म्हटले जात असे.कोकणातील पाषाण प्रस्तरावर निर्मित झालेली चित्र व शिल्प संस्कृती ही वैविध्यपूर्ण असून ती फारच अतिप्राचीनआहे. या कलात्मक संस्कृतीची निश्‍चित कालगणनाही अद्याप झालेली नाही.तसेच ही कलानिर्मिती कोणत्या कारणासाठी, कधी, कोणासाठी निर्माण झाली आणि कोणी निर्माण केली, याबद्दलचे ठोस पुरावे अद्यापपर्यंत उपलब्ध झालेले नाहीत किंवा त्यांचा साधा मागमूसही सापडलेला नाही.कोकण किनारपट्टीवरील हिवाळे आणि कुडोपीसारखी अनेक ठिकाणे पुरातत्वीयदृष्ट्या खूप महत्वाची असून ती या भागातील आदिम मानवी समूह वत्यांची वसतीस्थाने यांच्याबद्दल माहिती उपलब्ध करून देऊ शकतील. मात्र, या ठिकाणांचे तज्ज्ञांकडून सातत्याने परिक्षण होणे, हाती येणार्‍या माहितीचा संयुक्तिक अर्थ लावणे, त्यांचा कालावधी निश्‍चित करणे इत्यादी बाबींवरलक्ष केंद्रीत करावे लागेल. अशा प्रकारच्या संशोधनामुळे कोकण प्रांताच्या इतिहासावर अधिक प्रकाश पडण्याची शक्यता आहे. तसेच, ही ठिकाणे पर्यटनदृष्ट्याही विकसित केल्यास कोकणच्या पर्यटन विकासालाही त्यांचा निश्‍चितच हातभार लागू शकेल. मात्र त्यासाठी सरकारला संबंधित क्षेत्रे अधिग्रहीत करुन ती संरक्षित म्हणून जाहीरकरावी लागतील.मात्र अशी कृती आजपर्यंत कोणत्याच सरकारने केलेली नाहीत. कोकणातील लोकप्रतिनिधीही या बाबतीत उदासीन आहेत.

अमोल पालये, रत्नागिरी.
वाडाजूनच्या सड्यावर 30 कातळशिल्पांचा खजिना!
March 14, 2024


दिवाळीदिवशी वाडाजूनच्या सड्यावर
शोधला 30 कातळशिल्पांचा खजिना!

सडयेच्या तरूणांनी शोधली मानवासह रेड्यांची मोठाली पावलं, गुढ चाव्या, प्राणी आणि मडके





सहभागी तरूण आणि तरूणी.
 
रत्नागिरी : नरकचतुर्दशी म्हणजे पहाटेचे अभ्यंगस्नान, दिवाळी फराळ आणि फटाक्याची आतषबाजी.. हा सारा नेहमीचा रिवाज टाळत सडयेतील तरूणांनी सलग तिसर्‍या वर्षी नरकचतुर्दशी दिवशी कातळशिल्प शोधयात्रा काढली. या शोधयात्रेतून सडये-वाडाजूनच्या सड्यावर थोडाथोडका नव्हे, तर तब्बल तीसेक ठाशीव, सुस्पष्ठ कातळशिल्पांचा समुह आढळून आला. छोटी, मध्यम आणि मोठाली अशी एकूण 10 रेड्यांची पावलं या ठिकाणी आढळून आली आहेत. 10 मानवाची पावलं आढळून आली आहेत, तर 2 मोठाल्या चाव्याकृती आकृत्या, 2 प्राणी, 1 मडके अशी 30 चित्रे प्रथमच आढळली आहेत.
सडयेतील तरूण मंडळी दरवर्षी दिवाळीनिमित्त पदयात्रा काढत असतात. यावर्षीची पदयात्रा वाडाजून सड्यावरील ‘रेडेबावलं’ या गुढकथांनी  प्रसिध्द असलेल्या ठिकाणी गेली होती. बारा रेड्यांची जोतं आणि बारा माणसांच्या दुर्घटनेच्या कथित दुर्घटनेठिकाणी जावून या तरूणांनी सर्व अंधश्रध्दांना मुठमाती देण्याचा प्रयत्न या यात्रेनिमित्त केला.
या पदयात्रेद्वारे सडे-कातळ धुंडाळून त्यावरील पाण्याचे स्त्रोत, प्राचीन देवस्थाने, देवराया, पाण्याची टाकी, बारव, कातळशिल्पे, घाट्या, सड्यावरील जीवसृष्टी, रानटी झाडे आणि त्यांचे औषधी उपयोग आदी.ची माहिती सडयेतील तरूण-तरूणी, विद्यार्थी एकत्रितरित्या बुजुर्गांच्या मदतीने घेत असतात. सडयेतील शालेय विद्यार्थी या पदयात्रेत सहभागी होत असतात. त्यामुळे भावी पिढीला निसर्गवाचन होते. परिसर-भूगोलाची माहिती मिळते. इतिहास-संस्कृती याविषयी ज्ञान मिळते. गेली दोन वर्षे काढलेल्या पदयात्रेत सडयेच्या सड्यावरील कातळशिल्पे शोधून त्यांचे संवर्धन प्रयत्न करण्यात आले आहेत. याशिवाय टाकी, बारव उजेडात आणण्याचे काम केले आहे.
यावर्षीची पदयात्राही अशीच वैशिष्ठपूर्ण ठरली आहे. सकाळी 9 वा. सडये देवस्थान येथून ही पदयात्रा सुरू झाली. यावेळी या शोधयात्रेचे संस्थापक सदस्य आणि वाटाडेे म्हणून काम पाहणारे स्व.सुरेश उर्फ आप्पा धुमक यांना श्रध्दाजंली वाहून पदयात्रेची सुरूवात करण्यात आली.

 



रेड्यांची ठाशीव पावले.
ओघवती माहिती
यावर्षीच्या पदयात्रेचे मार्गदर्शन सडये-पिरंदवणे-वाडाजून परिसराची इत्यंभूत माहिती असणारे रानमाणूस श्री.आत्माराम धुमक यांनी केले. रानवाटा, गावांच्या सीमारेषा, जमीन मोजणीच्या जुन्या ऐरणी, रानटी औषधी झाडे आणि त्यांचे उपयोग, प्राचीन बांधीव घाट्या, कातळशिल्पे आणि त्यामागच्या दंतकथा याबाबत सार्‍या प्रवासात ओघवती माहिती दिली.
 



कातळावर पाणीस्त्रोताजवळ फुललेली कमळे.
 
रानकमळांची बाग
विस्तीर्ण पसरलेल्या आणि रणरणत्या उन्हात तापलेल्या कातळावर एकेठिकाणी पांढर्‍याशुभ्र रानकमळांची सुरेख बागही द़ृष्टीपथास आली. 

 




 
8 किमीची पदयात्रा
कातळशिल्प प्रवासाला सुरूवात करताना वाडाजून या गावची भव्य घाटी लागली. गर्द झाडीच्या छायेतून पदयात्रेने कातळावर प्रवेश केला. वाडाजून या गावापासून सुमारे 8 किलोमीटर अंतर पार केल्यानंतर विस्तीर्ण कातळावर आत्माराम धुमक यांनी कातळशिल्पांचा समुह दाखविला तेव्हा सारे यात्रेकरू अक्षरश: अचंबित झाले. अत्यंत सुबक, ठाशीव, सुस्पष्ठ अशा अनेक आकृत्या एकाच ठिकाणी पाहून सारे कुतूहलात दडले. काही आकृत्यांचा अर्थबोध होत होता, तर काही गुढ होत्या. 



रेड्याचे 8 फुटांचे पाऊल.
अद्भूत रेडेबावलं
यावेळी बोलताना आत्माराम धुमक म्हणाले की, या जागेला ‘रेडेबावलं’ असे म्हणतात. या कातळशिल्पांच्या शेजारीच एक शेतजमीन आहे. या शेतजमीनीत मोठ्या प्रमाणात नाचणी, वरी, भातशेतीचे उत्पादन पुर्वी घेतले जाई, मात्र प्राचीन काळी एकेवर्षी लावणी करत असताना केलेल्या चिखलात बारा रेड्यांची जोते, बारा नांगर्‍यांसह रुतली, आणि गतप्राण झाली, आणि तेव्हापासून या जागेला गुढ वलय निर्माण झाले. म्हणून या जागेला रेडेबावलं म्हणतात.


रेडयांची मोठाली पावलं
या कातळशिल्पांचे निरीक्षण करता याठिकाणी रेडे किंवा घोडा यांच्या पायांचे ठसे कोरलेले दिसून आले. काही ठसे हे छोटे, काही मध्यम तर काही मोठाले कोरलेले आहेत. मोठाल्या पावलांची लांबी 8 फूट, आणि रुंदी 6 फूट इतकी आढळून आली. अशी दहा पावले सुस्थितीत दिसून आली. एका पावलाशेजारी ‘भाला’ या शस्त्राची आकृतीही कोरलेली दिसून आली. याशिवाय मानवाची पावलंही आढळून आली आहेत. मानवी पावलांची संख्याही 10 आहे. ती चांगली खोलगट असून, काही ठिकाणी जोडपावलं, तर काहीठिकाणी चालीची पावलं रेखाटलेली आहेत. या सार्‍या पावलांची दिशा ही पश्चिमेकडे जाताना दिसत आहे. 


तीन लंबाकृती प्राणी
याशिवाय तीन प्राणीही चितारलेले आहेत. तिन्हीही प्राणी लंबाकृती आहेत. एकाचे तोंड निमुळते आहे. त्यांच्या डोळ्यांची खोबणी खोलगट आहे. एक प्राणी विमानाच्या आकृतीसारखा आहे. एक माशासारखा प्राणी आहे. एक शंखाकृती आकृतीही आहे. एक मडकेही चितारलेले आहे. 


गुढ चावीकृती आकृत्या
या सार्‍या आकृत्यांमध्ये दोन आकृत्या या ‘चावी’ आकाराच्या आहेत. दोन्ही चाव्या मोठाल्या आहेत. चावीचा पुढील काडीचा लांब भाग 6 फूट लांब आहे. चावीचा मागील भाग आयताकृती आहे. हा आयतही 6 फूट लांब आणि 4 फूट रुंद आहे. या आयताच्या मध्यभागी 2 चौकोन असून त्यामध्येही काही आकृतीबंध काढण्यात आलेले आहेत. अशी एकूण 30 चित्रे दृष्टीपथात आली, प्रत्यक्षात त्यांची संख्या अधिक असण्याची शक्यता दाट आहे. काही ठिकाणी गवत रुजल्यामुळे ती झाकली गेली आहेत, मात्र काही ठिकाणी त्यांची सुस्पष्ठता, सुबकता आणि रेखीवपणा नजरेत भरण्यासारखा आहे.
 


रानमानसाचा सन्मान
पदयात्रेत सहभागी झालेल्या तरूणांनी सुरूवातीला सर्व रेखाचित्रांची स्वच्छता केली. त्यानंतर काही अस्पष्ठ होणार्‍या चित्रांचे रंगाने रेखाकंन केले.  त्यानंतर या चित्रांचे निरीक्षण करून चित्राकृतींचा अर्थ लावण्याचा प्रयत्न केला. रेड्यांच्या पावलांची चित्रे म्हणूनही कदाचित या परिसराला ‘रेडेबाऊल’ असे नाव पडले असेल, असाही तर्क तरूणांनी व्यक्त केला. पदयात्रेच्या शेवटी पदयात्रेतील संस्थापक सदस्य श्री.अनंत धुमक यांनी रानमाणूस वाटाडे श्री.आत्माराम धुमक यांचा श्रीफळ, वस्त्र देऊन सन्मान केला, व सहकार्याबद्दल धन्यवाद मानले.
पदयात्रा यशस्वी करण्यासाठी पदयात्रेचे संकल्पक अमोल पालये, मारूती धुमक आणि अनंत धुमक यांनी मेहनत घेतली. पदयात्रेत सुरज माने, निखिल पालये, रोशनी पालये, तेजस्विनी पालये, वेदिका तांबे, तनिष्क लोखंडे, आत्माराम धुमक आदी. सहभागी झाले होते.

ग्रामपंचायतीला साकडे
या कातळशिल्पांची ओळख सर्वदूर व्हावी, यासाठी कातळशिल्प शोधयात्रा पदयात्रींनी सडये-पिरंदवणे-वाडाजून गु्रप ग्रामपंचायतीला निवेदन सादर केले आहे. कातळशिल्पांचे संवर्धन व्हावे, त्याठिकाणी संरक्षक कठडे बांधावेत, मुख्य मार्गावर फलक लावण्यात यावे, अशा मागणी निवेदनाद्वारे केली आहे.






























Comments






 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
sinhasannews.com
वेल्हे तालुक्यातील कादवे गावाच्या तळमाळावर आढळली कातळ शिल्प कलाकृती
Amol Sable
~3 minutes
Img 20240212 215959
इतिहास संशोधक मंडळाचे आजीवन सदस्य असलेले मंगेश नवघने यांनी घेतला शोध..

पुणे : पुणे जिल्ह्याच्या हवेली व वेल्हा तालुक्याच्या हद्दीवर असणाऱ्या आंबी व कादवे या दोन्ही गावच्या सीमेवर डोंगरावर खडकाच्या पुष्ठ भागावर प्राचीन कोरलेली काही रेखाटन आढळून आली आहेत. इतिहास संशोधक मंडळाचे आजीवन सदस्य असलेले मंगेश नवघने यांनी याचा शोध घेतला आहे.

मंगेश नवघने म्हणाले, पानशेत धरणाचे फोटो घेण्यासाठी आम्ही 3 मित्र डोंगरचा माळ अन् त्यावर असलेले पाण्याच्या   अवतीभवती फिरत असताना आम्हाला कोरलेली शिल्पे  आढळून आली आहेत.

रिंग असलेले कप , जोडलेले कप , शेपटी कप , एककेंद्री वर्तुळ , कोन, शिवलिंग, ठिपके असे प्रकार या शिल्पात आम्हाला आढळल्या आहेत. या काळ्या खडकावर अनुकुचीदर हत्याराने ही चिन्हे कोरली गेली असावीत.

यावेळी नवघने यांच्या बरोबर वेल्हा तालुकाचे स्वराज्याचे शिलेदार प्रतिष्ठानचे अध्यक्ष अक्षय जागडे व मुळशी उपाध्यक्ष अनिल कडू हे उपस्थित होते. ही सापडलेल्या शिल्पकृतीबाबत पुरातत्व विभागाच्या संशोधकांना माहिती दिली असून याचा अभ्यास केला जाणार असल्याचे नवघने यांनी सांगितले.

Img 20240108 wa00275156040066815977370
या संदर्भात डेक्कन कॉलेज पुरातत्व विभागाचे संशोधक डॉ.  सचिन जोशी यांच्याशी संपर्क केला असता त्यांनी सांगितले की, मंगेश नवघने यांना सापडलेले कातळशिल्प किंवा कातळ कलाकृती जी आहे ती २५० ते ३०० वर्षापूर्वीची असण्याची शक्यता आहे. त्यावर शिवलिंग कोरलेले दिसत आहे.  काही लोकांनी इतर ठिकाणी सापडलेल्या अशा शिल्पांना उगाचच नवाश्मयुगापर्यंत नेलं आहे पण त्याला अर्थ नाही. नवाश्म युगात देव ही कल्पनाच नव्हती तर कोणी शिवलिंग वगैरे का काढेल. ही सापडलेली शिल्प बराच वेळा धार्मिक ठिकाणी किंवा मंदिरांच्या अवतीभवती दिसतात, डोंगरावरती आढळून येतात. या शिल्पांमध्ये दिसत असलेले ठिपके म्हणजे त्यावेळी खेळले जाणारे खेळ आहेत. ही शिल्प स्थानिक लोकांनी केलेली असली तरी ती त्याच्या आकारावरून कलाकृतीवरून २५० ते ३०० वर्षांपूर्वीची असण्याची शक्यता आहे.

जोशी म्हणाले,  नवघने यांना जशी कातळ शिल्प मिळाली आहेत तशीच जुन्नर, नारायणगाव, आंबेगाव या परिसरात देखील आढळून येतात. कोकणात असणारी कातळ शिल्प आणि या ठिकाणी असणारी शिल्प ही संपूर्ण वेगळ्या प्रकारची आहेत. कोकणातील शिल्पावर,  प्राणी माणसं यांच्या आकृत्या दिसून येतात. सह्याद्रीत आढळणारा बेसॉल्ट नावाचा दगड त्याचं वैशिष्ट्य म्हणजे या काळया दगडावर काही करायचं म्हटलं तर त्याला लोखंडासारख्याच वस्तू वापराव्या लागतात. कोकणामधील कातळ शिल्प ही जांबा दगडावरती कोरलेली आहेत आणि हा जांबा दगड सॉफ्ट असतो. आपल्याकडच्या काळया दगडावर दगडांच्या हत्यारांनी काही करता येऊ शकत नाही म्हणूनच ही शिल्प अश्मयुगातील नाहीत हे मात्र नक्की.

 
 
 lokmat.com
Ratnagiri: दापोलीत आढळले दहा हजार वर्षापूर्वीचे कातळशिल्प, एलियनसदृश्य कातळशिल्पाबाबत कुतूहल
ऑनलाइन लोकमत
~2 minutes
शिवाजी गोरे

दापोली :  तालुक्यातील उबर्ले गावात एलियनसदृश्य कातळशिल्प आढळल्याने हे गाव चर्चेत आले आहे. हे कातळशिल्प १० हजार वर्षापूर्वीचे असल्याचा दावा अभ्यासकांनी केला आहे. अशा प्रकारचे कातळ शिल्प अन्यत्र कोठेही आढळलेले नसल्याचेही अभ्यासकांनी सांगितले.  

उंबर्ले गावात 'गाढवाचा खडक' म्हणून ओळखल्या जाणाऱ्या जांभ्या सड्यावर शिल्पसमूहात सहा कातळशिल्पे आढळली आहेत. यात एका मानवाकृतीसोबत तीन हरणे व दोन बैल या प्राण्यांची चित्रे आहेत. मानवाकृती सुमारे साडेचार मीटर लांबीची आहे. तिच्या डोक्यावर शिरस्त्राण अथवा पागोट्यासारखा आकार असून त्यावर झाडाच्या सरळ फांदीसारखी रचना दिसते. 

कोकणात आतापर्यंत आढळलेल्या कातळशिल्पांमध्ये बैल हा प्राणी आढळला नव्हता. शिंग आणि वशिंडधारी असे हे दोन बैल आहेत. त्यामुळे ही कातळशिल्पे आजपासून किमान पाच  दहा हजार वर्षांपर्यंतच्या काळातील असावीत, असा अंदाज करता येतो. बैल हा प्राणी असल्याने, या शिल्पांचा कालावधी हा नवाश्मयुगीन, म्हणजे मानवाला शेतीचा शोध लागला त्या काळातील असावा, असा अंदाज आहे. अर्थातच यासाठी सूक्ष्म अभ्यासाची गरज असल्याचे डॉ. धनावडे यांनी नमूद केले.

रहस्य उलगडणार

आजवर केवळ दक्षिण रत्नागिरीत राजापूर, लांजा परिसरात सापडलेली कातळशिल्पे आता उत्तर रत्नागिरीतदापोली व मंडणगड तालुक्यांतही आढळली आहेत. दापोलीतील उंबर्ले गावातील कातळसड्यावर सापडलेले कातळशिल्प अत्यंत कुतुहलजनक आहे. तर मंडणगड तालुक्यातही कातळशिल्पाचा अभ्यास सुरू करण्यात आला आहे. डॉ. अजय धनावडे यांनी या ठिकाणी भेट देत, त्यांची मोजमापे, छायाचित्र घेत अभ्यास सुरू केला आहे. यामुळे या कातळशिल्पांचे रहस्य उघडणार आहे.

 
 
 इथे होकायंत्र काम नाही करत। कोकणातील एक अद्भुत ठिकाण आणि रावणाचं कातळशिल्प - देवाचे गोठणे ,राजापूर
कोकण आणि कोकणातील कातळशिल्प
कोकण हे राज्यांतील सर्वात चांगलं पर्यटन स्थळ आहे. कोकणातील समुद्र किनारे, या ठिकाणची खाद्य सांस्कृती, सिंधुदुर्ग किल्ला, स्थानिक लोक यामुळे कोकणात पर्यटकांना यावसं वाटतं.कोकणातील पर्यटन मध्ये आता कातळशिल्प यांचं महत्व वाढताना आता आपल्याला दिसतंय.कोकणातील अनेक गावांमध्ये शेकडो कातळशिल्पांचा शोध लागला आहे आणि पुढे जाऊन हा आकडा वाढू शकतो.
कोकणातल्या जांभा दगडाच्या पठारावर म्हणजे कातळावर आढळणारी कातळशिल्पे हे आजही एक मोठे गूढ आहे. विविध चित्रे आणि अगम्य अशा आकृत्या व भाषा यांनी ही शिल्पे समृद्ध आहेत आणि ती कोणी आणि नेमकी केव्हा खोदली याचा उलगडा अजूनही झालेला नाही! कोकणातील, विशेषतः रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात आणि गोव्यात असलेला जांभा खडक या शिल्पांसाठी अगदी आदर्श असावा असे या भागात सुरू असलेले संशोधन सुचविते.
कोकण आणि गोव्यात आढळणारी ही चित्रे आणि आकृत्या कोणी आणि कधी काढल्या असाव्यात याची नेमकी कालगणना आज तरी उपलब्ध नाही. काहींच्या मताप्रमाणे ही कातळ चित्रे इ.पू. १० ते १२ हजार वर्षे जुनी असावीत. इथल्या दुय्यम (Secondary) जांभा पठारावर ही शिल्पे आढळतात. आज अनेक ठिकाणी रस्ता रुंदीकरणात किंवा नवीन इमारतींच्या बांधकामामुळे काही दुर्मीळ शिल्पे गायब झाली आहेत व होत आहेत.
रत्नागिरी जिल्यातील राजापूर तालुक्यातील एक सुंदर गाव देवाचे गोठणे.देवाचे गोठणे या गावचा इतिहास येथील भार्गवराम मंदिर जे सुमारे 450 वर्ष जून असू शकत त्यावरून या गावचा इतिहास प्रत्ययास येतो . भार्गवराम म्हणजेच परशुराम यांचं हे मंदिर जून आहेच पण देखणं ही आहेच . मंदिरायच्या परिसरात एक दगडी अष्टकोनी दीपमाळ आहे . देवासाठी हे आग इनाम म्हणून मिळाले त्यामुळे गावच नाव देवाचे गोठणे .
या गावात सड्यावर(माळरानावर ) एक वेगळंच आश्चर्य आपल्याला पहायला मिळत . सद्याच नाव आहे रावणाचा सडा. या सड्यावर रावणाची छाप देखील आहे.दंतकथा अशी आहे की जेव्हा रावण सीतेला घेऊन जात होता तेव्हा तो तिकडे अडकून पडला आणि त्याची ती आकृती तयार झाली . पण खरं तर ते एक कातळशिल्प आहे . Petroglyphs अस त्यांना संबोधलं जात पण हे petroglyphs लेण्यांमध्ये, भिंतीवर एक उभ्या दगडात कोरलेलं असतात पण कोकणात माळरानावर कातळात कोरलेले पहायला मिळतात . अनेक अशी कातळखोद शिल्प प्राणी पक्षी अनेक अश्या आकृत्या ज्यांच्या कडे बघून अस वाटतच नाही की हे सर्व तेव्हा असेल पण ते आपल्या पूर्वजांना किंव्हा आदिमानवाना कस काय माहित.तरीपण हा आपला ठेवा आहे तो आपण जपला पाहिजे ☺️
या रावणाच्या कटाळशिल्पचं एक वैशिष्ट्य आहे इकडे होकायंत्र (Compass) चालत नाही त्या कातळशिल्प वर कुठेही होकायंत्र ठेवलं असता दिशा वेगवेगळ्या दिसतात , आणि यालाच चुंबकीय विस्थापन म्हणतात . या magnetic field मुळे हा चमत्कार होतो ,पण हे सर्व तेवढ्याच भागात होत.
बाकी सर्व माहिती खाली दिलेल्या लिंक वरती मिळेल
 
 
 
त्या काळातील गुगल नकाशे
ते मानवी जगण्याचे साधन होते

तुम्हाला अनेकदा दगडी गोळे जवळपासही आढळतील.
गोळे - खगोलीय संरेखन, मोजमाप, गणना करण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या साधनाचा भाग आहेत आणि नेव्हिगेशनसाठी वापरले जात होते.
त्यांनी त्यांचा वापर शस्त्रे म्हणून देखील केला असेल (जर ते पुरेसे मोठे असतील तर) आणि पराभव आणि विजयाचे चिन्ह म्हणून ते एकमेकांपासून चोरले असतील.

एकाच गटात एकत्र सापडलेले बरेच जण व्यापारासाठी होते
कदाचित मोठ्या भागात पसरलेले बरेच जण कदाचित युद्धस्थळ होते (मृतांचे अवशेष)
लहान आणि तुरळक आढळलेले ते कदाचित वैयक्तिक आणि वैयक्तिक वापरासाठी होते.

विणलेल्या दोरीने किंवा कदाचित आतडे किंवा चामड्याने पण काठीने बनलेला दगड.


याचा वापर सर्वेक्षण आणि वेळेचे निरीक्षण करण्यासाठी केला जात असे जे नंतर नेव्हिगेशनमध्ये आणि बांधकाम करताना पातळी निश्चित करण्यासाठी मदत करते.
उर्वरित उपकरण कदाचित खूप पूर्वीपासून गायब झाले आहे, जरी तुम्हाला काय शोधायचे हे माहित असेल तर अजूनही काठीची कलाकृती असू शकते... त्यांच्या जवळ/सोबत काहीतरी धातू आढळू शकते (कोरीवकाम केलेले हाड देखील).

पण ते उत्तर, दक्षिण, पूर्व आणि पश्चिम... आणि क्षैतिज, उभे आणि कर्णरेषा एकत्र करून रेखावृत्त इत्यादी शोधण्यास मदत करते.

प्रथम उत्तर तारा (ध्रुव तारा) ओळखण्याच्या आधारावर काम करते कारण तो आकाशात जवळजवळ नेहमीच अचूक असतो.

गिझाच्या ग्रेट पिरॅमिडच्या नॉर्थ क्वीनच्या चेंबर शाफ्टमध्ये एकाचे अवशेष सापडले.

ते जगभरात हजारो वर्षांपासून वापरात होते कारण ते सर्वत्र आहेत
असे दिसते की शिकारी-संग्रह भटक्या विमुक्त असतील परंतु ते इतरांपेक्षा खूप प्रगत होते.
त्याला मेर्खेत म्हणतात... आणि ते मुळात सेक्स्टंटसारखे आहे.


इजिप्शियनमध्ये एका लाकडाच्या तुकड्यासह आला होता जो "गायब" झाला आहे आणि जसे तुम्ही अपेक्षा करता आणि कार्बन१४ चा विचार करता... ते संरचनांच्या खऱ्या तारखांवर बरेच कट रचते.

चेंडूंवरील कोणताही सजावटीचा परिणाम कदाचित अंशतः फक्त वैयक्तिकृत आणि सजावटीचा असेल... आणि तुमचे स्वतःचे साधन ओळखण्यायोग्य बनवेल... कदाचित त्याच्याभोवती दोरी बांधून लटकण्यास मदत झाली असेल.

तर हेंजेस - ते कुटुंबे आणि समुदायांसाठी एक मध्यवर्ती केंद्र आहेत
- प्रवाशांसाठी एक विश्रांती बिंदू देखील आहे जिथे नकाशा, घड्याळ आणि वार्षिक कॅलेंडर सर्व एकाच वर्तुळात आहे.

एका रात्री इकडे तिकडे भटकंती करणे आणि फक्त तारे आणि दिशानिर्देशांचे संरेखन केल्याने येणाऱ्या हवामानाचा, शिकारीसाठी प्राण्यांचे स्थलांतर इत्यादींचा दीर्घकालीन अंदाज येत नाही...
म्हणून तुम्हाला ती सर्व माहिती दर्शविणारी अधिक कायमस्वरूपी रचना हवी असेल.

ते दगडांपासून बनलेले होते आणि विशेषतः त्या ठिकाणी दगड आणले होते ही वस्तुस्थिती दर्शवते की तो परिसर किती महत्त्वाचा होता, संरचना किती महत्त्वाच्या होत्या आणि त्या त्यांच्या टिकाऊपणावर - टिकून राहण्यावर किती अवलंबून होत्या.

जर तुम्हाला ते कसे वाचायचे हे माहित असेल... मध्यभागी उभे राहून सूर्य कुठे आहे आणि सावल्या कुठे पडतात हे पाहत असाल तर तुम्हाला दिवसाची वेळ कळेल... रात्रीही तारे वापरून आणि दिशा दाखवण्यासाठी... तुम्हाला संक्रांती आणि विषुववृत्तांद्वारे विशिष्ट ऋतू किती अंतरावर आहे हे कळेल.

आणि जर तुम्हाला ऋतू माहित असतील... तर तुम्हाला कळेल की थंडी कधी सुरू होते आणि हिवाळा कधी येतो... किंवा वसंत ऋतूमध्ये तुम्हाला कळेल की अन्नाचे स्रोत पिकत आहेत/उपलब्ध आहेत... स्थलांतराचे प्रकार आणि प्राण्यांच्या शिकारीच्या वेळा... आणि तुम्ही त्या दिशेने पुढे जाल,
त्यांना जे काही जाणून घ्यायचे आहे ते सांगेन.

या वास्तू प्रत्यक्षात सूचित करतात की त्या निश्चितच भटक्या, शिकारी गटांनी बांधल्या होत्या
गोबेकली टेपे प्रमाणेच... हे हेंगे आहे... ती वास्तू आधी बांधली गेली (त्यांना हे माहित आहे) आणि शेती नंतर आली
पुन्हा... जगण्याची पहिली गरज ... स्थानाची पहिली गरज ... अन्न, पाणी, निवारा आधी उपलब्ध आहे नाहीतर तुम्ही मराल.

जर उत्तर स्तंभ नसेल तर ज्या तेजस्वी ताऱ्याशी ही रचना जुळवली आहे ती निश्चितपणे तारीख ठरवण्यास मदत करेल आणि ती करणे खूप सोपे आहे - पुरातत्वशास्त्र

प्रवास मार्गांवर कायमस्वरूपी बांधकामे जी तुम्हाला आवश्यक असलेली सर्व माहिती दर्शवितात आणि रात्री-अपरात्री सर्वकाही संरेखित न करता, परंतु म्हणूनच ते खगोलशास्त्रीयदृष्ट्या रांगेत असतात आणि वेळोवेळी जोडले गेले असते.

लोक कदाचित दिवसा तिथे राहिले असते... पण कदाचित रात्री प्रवास करत असतील जेणेकरून ते हरवू नयेत
आणि समुदाय कदाचित अधूनमधून तिथे जमत असतील... कदाचित तुम्हाला काहीतरी फॅन्सी हवे असेल तर अन्न, कातडे, अगदी सजावटीचे गोळेही देवाणघेवाण करत असतील... आणि/किंवा वार्षिक शिकारींना समन्वित आणि आदरांजली वाहत असतील... संभाव्य जोडीदारांना भेटू शकले इत्यादी
बहुउद्देशीय

हेंगेजच्या जवळ, आत किंवा आजूबाजूला लोक जमल्याचे इतर कोणते पुरावे जसे की व्यापार/कॅम्पिंग/शेताळे इत्यादी आढळतात याबद्दल मला पुरेशी माहिती नाही, परंतु मी असे सुचवेन की ते नक्कीच जवळ असेल.

दगडांच्या लेआउटमध्ये (किंवा कोरीवकाम देखील) इतर माहिती असू शकते जी उदा. विशिष्ट दिशेने पाण्याची उपलब्धता... आणि पुढील बांधकामापर्यंतचे अंतर इत्यादी दर्शवू शकते.
उदाहरणार्थ, लिंटेल... त्या दिशेने जाऊ नये असे सूचित करू शकते कारण तेथे काहीही नाही किंवा जर तुम्ही असे केले तर त्या दिशेने छावण्या आणि निवारा उपलब्ध आहेत.
तुलनेने जवळच्या दोन हेंगे आणि त्यामधील कोणत्याही खुणा यांच्यामधील माहिती (खडकांची जागा आणि कोरीवकाम आणि वस्त्यांचे पुरावे) तुलना करणे त्यांना अधिक समजून घेण्यास मदत करेल.

मूलभूत बांधकामे ही एकतर लोक स्थलांतरित झाल्यावर केलेली पहिली बांधकामे होती... इतरांकडे जलद थांबे... किंवा चांगली जागा सापडल्यावर ती अजिबात पूर्ण झाली नाहीत.
ते जितके अधिक गुंतागुंतीचे होते... लोक सामान्य क्षेत्रात जास्त काळ होते कारण तेथे अधिक नैसर्गिक संसाधने उपलब्ध असती आणि त्यांना राहण्याचे कारण होते.

जर हेंगे साइटवर लोकसंख्या नैसर्गिक संसाधनांपेक्षा जास्त असेल... किंवा काही कारणास्तव परिसर नैसर्गिकरित्या बदलला असेल तर तुमच्याकडे पुढे जाण्याशिवाय पर्याय राहणार नाही.

पण एकदा लोक पिके/प्राणी शेती करायला शिकले की तुम्ही कायमस्वरूपी घरे बांधू शकता आणि खरोखरच त्याची गरज भासणार नाही (हेंगे) पण दैनंदिन नेव्हिगेशनसाठी तुम्हाला अजूनही तुमच्या मर्खेतची आवश्यकता असेल.


हा माझा सिद्धांत आहे ज्याचा दुर्दैवाने एलियन्सशी काहीही संबंध नाही

 
 https://www-metmuseum-org.translate.goog/perspectives/cycladic-figures?_x_tr_sl=en&_x_tr_tl=mr&_x_tr_hl=mr&_x_tr_pto=tc&_x_tr_hist=true
सुरुवातीच्या चक्रीय व्यक्तिरेखा कोण होत्या?
या गूढ वस्तूंमागील आकर्षक इतिहास जाणून घ्या.
जोसेफ अलेक्झांडर मॅकगिलिव्ह्रे
२४ जानेवारी २०२४
१२ मिनिटे वाचले
एजियन समुद्राच्या मध्यभागी असलेल्या ग्रीक बेटांवर नग्न महिलांच्या पोटावर हात गुंडाळलेल्या निओलिथिक आणि सुरुवातीच्या चक्रीय आकृत्या कोरल्या गेल्या आहेत, ज्या एका अनोख्या संस्कृतीचे प्रतिनिधित्व करतात जी सुमारे 5300 ते 2000 ईसापूर्व पर्यंत भरभराटीला आली आणि अचानक गायब झाली. नंतरच्या ग्रीक लोकांनी या बेटांना सायक्लेडिक म्हटले, ग्रीक कायक्लोस (वर्तुळ) पासून, कारण ते ऑलिंपियन जुळ्या आर्टेमिस, निसर्ग, प्रजनन आणि बाळंतपणाची देवी आणि संगीत, औषध आणि सूर्याची देवता अपोलो यांचे पवित्र जन्मस्थान डेलोसभोवती वेढले होते. या प्रागैतिहासिक पांढऱ्या संगमरवरी आकृत्या कोण होत्या आणि त्यांच्या वैशिष्ट्यपूर्ण पोझचा अर्थ काय होता?

सायक्लॅडिक बेटांसह ग्रीसचा नकाशा.
सायक्लॅडिक बेटांचा नकाशा

१८३० मध्ये आधुनिक ग्रीक राज्याच्या स्थापनेनंतर जवळजवळ दोन शतकांपूर्वी या आकृत्यांचा पुनर्शोध लागल्यापासून पुरातत्वशास्त्रज्ञांना या आकृत्यांचा अर्थ कळत नव्हता. संपूर्ण युरोपमधील प्रवासी या नव्याने स्थापन झालेल्या देशाचा शोध घेण्यासाठी धावले, प्राचीन ग्रंथांमध्ये त्यांनी फक्त वाचलेल्या गौरवशाली भूतकाळाचे अवशेष शोधत होते. पाचव्या शतकात, अथेनियन इतिहासकार थुसिडाइड्स, अहवाल देतात की जेव्हा नोसोसचा राजा मिनोसने क्रेटपासून सायक्लेड्सपर्यंत आपली थॅलेसोक्रसी किंवा समुद्रावरील राज्य वाढवले तेव्हा त्याने तेथे स्थायिक झालेल्या आशिया मायनरच्या कॅरियन चाच्यांना हाकलून लावले. [१] म्हणून जेव्हा पहिल्या आधुनिक प्रवाशांनी ग्रीकपूर्व कबरी आणि कलाकृती पाहिल्या तेव्हा त्यांनी त्या या कॅरियन लोकांना दिल्या, ज्यांचे जन्मस्थान नैऋत्य अनातोलिया, आधुनिक तुर्की होते.

हात ओलांडलेली नग्न दगडी चक्रीय आकृती. ती राखाडी पार्श्वभूमीवर आहे.
संगमरवरी स्त्री आकृती , सुमारे २५००–२४००/२३०० ईसापूर्व. चक्रीय दुसरा प्रारंभिक. संगमरवरी, ५ ३/८ × २१ १/८ इंच (१३.६ × ५३.७ सेमी). लिओनार्ड एन. स्टर्न संग्रह, हेलेनिक प्रजासत्ताककडून कर्ज, संस्कृती मंत्रालय (एल.२०२२.३८.४७)

या प्रवाशांनी त्यांच्यासोबत सापडलेल्या संगमरवरी आकृत्या आणि साध्या भांड्या मिळवण्यास सुरुवात केली, ज्यांनी पूर्वीच्या मूर्तींना पोटावर हात गुंडाळलेल्या इजिप्शियन ममींची आठवण करून देणारे कच्चे काम मानले. [2] १८५९ मध्ये फ्रेंच राष्ट्रीय ग्रंथालयाला दान केलेले पहिले उदाहरण "आदिम व्हीनस" म्हणून शोधण्यात आले, [3] कारण फक्त ग्रीक प्रजनन देवी एफ्रोडाईट किंवा रोमन लोकांसाठी व्हीनसचे नग्न चित्रण करण्यात आले होते. एकोणिसाव्या शतकाच्या अखेरीस, त्यांची तुलना नैऋत्य अनातोलियातील इफिससच्या प्रजनन देवी आर्टेमिसच्या प्रागैतिहासिक पूर्वसुरीशी मोठ्या प्रमाणात केली जात होती, जी "पोषण करणाऱ्या दुधाचा अक्षय झरा" देण्यासाठी तिचे स्तन उघडते. [4]

विसाव्या शतकाच्या सुरुवातीच्या पुरातत्वशास्त्रज्ञांनी देवीच्या सिद्धांताला अधिक सामान्य स्पष्टीकरणांसह नाकारले जसे की उपपत्नीसाठी शाश्वत पर्याय किंवा नंतरच्या जीवनात त्यांच्या मालकांसोबत जाण्यासाठी बलिदान दिले जाणारे गुलाम. इतर सूचनांमध्ये मुलांची खेळणी समाविष्ट आहेत, कारण बहुतेक आधुनिक हातातील बाहुल्यांच्या आकाराचे आहेत; पूजनीय पूर्वजांच्या प्रतिमा; किंवा पुरुष आणि स्त्रियांच्या अपोट्रोपिक प्रतिमा ज्या त्यांच्या मालकांना मृत्यूनंतर वाईटापासून वाचवण्यासाठी डिझाइन केल्या आहेत. [5] हे स्पष्टीकरण प्रतिमांच्या विविधतेचा आणि त्या बहुतेकदा खोडल्या गेल्या, पुन्हा रंगवल्या गेल्या, दुरुस्त केल्या गेल्या आणि वस्त्यांमध्ये आढळल्या आणि केवळ अंत्यसंस्काराच्या संदर्भातच नाहीत तर त्या वस्तुस्थितीचा हिशेब देण्यात अपयशी ठरतात.

१९४८ मध्ये कवी रॉबर्ट ग्रेव्हज यांनी ' द व्हाईट गॉडेस' या काव्याच्या पौराणिक उत्पत्तीचा लोकप्रिय आणि प्रभावशाली अभ्यास करून देवीच्या सिद्धांताचे पुनरुज्जीवन करण्यास मदत केली. हा अभ्यास मानवजातीच्या गृहीतक असलेल्या सर्वात प्राचीन देवतेवर केंद्रित आहे: जन्म, प्रेम आणि मृत्यूची देवी.[6] निसर्गाशी सुसंगत असलेले अनेक समाज एका आकाश देवतेला मानतात जो नैसर्गिक जगाला जन्म देण्यासाठी आदिम पृथ्वी देवीला फलित करतो आणि प्रत्येक वर्षाच्या अखेरीपर्यंत तिचे पोषण करण्यास मदत करतो जेव्हा सर्व गोष्टी जमिनीवर परत येतात आणि सूर्याशी जोडलेल्या कधीही न संपणाऱ्या जीवनचक्रात पुन्हा उदयास येतात. ही मूलभूत जीवन देणारी देवी प्राचीन समाजांमध्ये असंख्य नावांनी दिसते, सुमेरियन किशरपासून, जो अक्काडियन इश्तार आणि बॅबिलोनियन अस्टार्टे बनतो, ते प्राचीन इजिप्तमधील हाथोरपर्यंत.

उजवीकडे पृथ्वी देवीच्या एका मोठ्या प्रसिद्ध दगडी पुतळ्याची प्रतिमा आणि कंबर बाहेर काढलेल्या एका सायकलॅडिक स्त्रीच्या आकृतीची एक छोटी मूर्ती.
डावीकडे: व्हीनस ऑफ विलेनडॉर्फ , सुमारे २४,०००–२२,००० ईसापूर्व. चुनखडी, ११.१ सेमी उंच निसर्ग इतिहास संग्रहालय, व्हिएन्ना (CC BY-NC-SA २.०). उजवीकडे: संगमरवरी स्त्री आकृती , सुमारे ५३००–३२०० ईसापूर्व. लेट नियोलिथिक, चक्रीय. २ १५/१६ × ५ १५/१६ इंच संगमरवरी (७.४ × १५.१ सेमी). लिओनार्ड एन. स्टर्न कलेक्शन, हेलेनिक रिपब्लिककडून कर्ज, संस्कृती मंत्रालय (L.२०२२.३८.१३१)

उघड्या स्तन आणि जननेंद्रियांसह सुरुवातीच्या चक्रीय महिला आकृत्या जीवन देणाऱ्या देवीसाठी उमेदवार बनल्या, [7] परंतु त्यांचा उद्देश कदाचित अधिक गुंतागुंतीचा आहे. नवपाषाण काळात कोरलेल्या सर्वात जुन्या आकृत्या उभ्या किंवा बसलेल्या क्रॉस-पाय असलेल्या समृद्ध स्त्री आकृत्या दर्शवितात ज्या युरोपियन पॅलेओलिथिकमधून जिवंत राहिलेल्या स्त्रियांच्या पहिल्या प्रतिमांसारख्या असतात, जसे की प्रसिद्ध व्हीनस ऑफ विलेनडॉर्फ (२४,०००-२२,००० ईसापूर्व). ३२०० ईसापूर्व कांस्य युगाच्या सुरुवातीसह, बेटवासीयांनी या आकृत्यांची वाढती संख्या निर्माण केली, जी पुढील सहस्राब्दीमध्ये अमूर्त खडे आणि योजनाबद्ध स्वरूपांपासून अधिक नैसर्गिक मानववंशीय शिल्पांमध्ये रूपांतरित झाली आणि अमूर्ततेकडे परत आली.

चक्रीय आकृत्यांच्या उत्क्रांतीचा मागोवा घेणारा जटिल तक्ता.
चक्रीय आकृत्यांच्या उत्क्रांतीचे चित्रण करणारा कालक्रम चार्ट.

याचे कोणतेही एकच स्पष्टीकरण नाही. आपल्याला स्त्री, पुरुष, आंतरलिंगी आणि अमूर्त आकृत्या आढळतात ज्या उभ्या, बसलेल्या किंवा झोपलेल्या, एकट्या किंवा गटात असू शकतात. वेगवेगळ्या शारीरिक गुणधर्म असलेल्या स्त्रिया त्यांचे सौर पेशींना डावीकडून उजवीकडे दुमडून झाकतात जणू काही ते रक्षण करत आहेत किंवा काहीतरी धरून आहेत. बारीक किंवा गुळगुळीत पुरुषांना बासरीवादक, वीणावादक, शिकारी किंवा योद्धा म्हणून कोरले गेले होते. या आकृत्यांचा विचार अनेक शक्यतांमध्ये केला पाहिजे. उदाहरणार्थ, बासरीवादक आणि वीणावादकांच्या जोड्यांची उपस्थिती सूचित करते की त्यांच्या अर्थाचा काही भाग सुरुवातीच्या रॅप्सोडिस्टशी जोडला गेला पाहिजे जे त्यांच्या प्रेक्षकांना गाणी आणि उत्पत्ती आणि कारनाम्यांच्या कथांसह मेळाव्यांमध्ये आनंदित करत असत, कदाचित दूरच्या देशांच्या आणि पूर्वीच्या काळातील आकृत्यांसह.[8]

बसलेल्या हार्परचा चक्रीय दगडी पुतळा.
संगमरवरी बसलेला वीणावादक , २८००–२७०० ईसापूर्व. उशीरा सुरुवातीचा चक्रीय पहिला–सुरुवातीचा चक्रीय दुसरा. संगमरवरी, २ १५/१६ × ५ १५/१६ इंच (७.४ × १५.१ सेमी). द मेट्रोपॉलिटन म्युझियम ऑफ आर्ट, न्यू यॉर्क, न्यू यॉर्क (४७.१००.१)

सर्वात जास्त प्रमाणात आढळणारे कॅनोनिकल नैसर्गिक आकृती प्रकार आहेत जे अर्ली सायक्लॅडिक II कालखंडात दिसून येतात, जो तांब्याच्या मिश्रधातूच्या उत्पादनात वाढ आणि व्यापक विनिमय नेटवर्कमुळे समृद्ध काळ होता. हे आकडे लहान 6.2 सेंटीमीटर ते 1.53-मीटर-उंच पुतळ्यांपर्यंत आहेत जे नंतरच्या संगमरवरी कोरे आणि कोरोईची आठवण करून देतात जे पुरातन ग्रीक अभयारण्ये आणि स्मशानभूमींमध्ये उभारले गेले होते, एकतर सातव्या ते पाचव्या शतकात दैवी किंवा त्यांच्या सेवेत असलेल्या मानवांच्या प्रतिमा म्हणून. नंतरच्या जीवन-आकाराच्या आकृत्या यशस्वी उद्योजकांनी किंवा केरोस बेटावर प्रदर्शनासाठी नियत समुदायांनी कमिशन केल्या असू शकतात, जिथे अलिकडच्या क्षेत्रीय कामामुळे मोठ्या आणि लहान आकृत्यांचे शेकडो तुकडे तयार झाले आहेत आणि इतर शोध जे धास्कलियो येथे स्थायिक प्रोमोंटरीच्या विरुद्ध कावोस येथे खडक आश्रयस्थानांसह एक मध्यवर्ती मंदिर दर्शवितात.[9]

हात ओलांडलेली नग्न दगडी चक्रीय आकृती. ही आकृती थोडीशी सपाट आहे आणि त्यावर गोल डोळे कोरलेले आहेत. ती राखाडी पार्श्वभूमीवर आहे.
संगमरवरी स्त्री आकृती, सुमारे २७००–२४००/२३०० ईसापूर्व. चक्रीय दुसरा प्रारंभिक. संगमरवरी, ८ १/२ × ३४ इंच (२१.६ × ८६.३ सेमी). लिओनार्ड एन. स्टर्न संग्रह, हेलेनिक प्रजासत्ताककडून कर्ज, संस्कृती मंत्रालय ( एल.२०२२.३८.४७ )

बेटावरील रहिवाशांना अनेक प्रकारचे दगड सहज उपलब्ध होते, जसे की बेसाल्ट आणि शिस्ट, आणि स्थानिक तांबे जे ते वितळवून हत्यारे आणि शस्त्रे तयार करत असत. ते घरगुती आणि दफनभूमीसाठी वापरल्या जाणाऱ्या भांडी आणि प्राण्यांच्या आकृत्या बनवणे खूपच सोपे आणि तितकेच टिकाऊ होते. तरीही सुरुवातीच्या चक्रीय कलाकारांनी संगमरवराची निवड केली, कदाचित त्याच्या पारदर्शक आणि स्फटिकासारखे स्वरूपामुळे, जे सूर्याचा प्रकाश टिपते आणि तयार केलेल्या कामांना त्यांच्या स्वतःच्या तेजस्वी आतील तेजस्वीपणाने बहाल करते.

एकाच चक्रीय नग्न स्त्री आकृतीचे दोन फोटो, ज्याचे हात ओलांडलेले आहेत. उजव्या बाजूला राखाडी पार्श्वभूमीवर स्पष्टपणे प्रकाशित झालेले चित्र आहे. दुसऱ्या फोटोमध्ये, आकृती पार्श्वभूमीत प्रकाश टाकून प्रकाशित झालेली आणि चमकदार आहे.
संगमरवरी स्त्री आकृती, सुमारे २५००-२४००/२३०० ईसापूर्व. सुरुवातीचा चक्रीय दुसरा. संगमरवरी, २ १३/१६ × ६ ११/१६ इंच (७.२ × १७ सेमी). लिओनार्ड एन. स्टर्न संग्रह, हेलेनिक प्रजासत्ताककडून कर्ज, संस्कृती मंत्रालय ( एल.२०२२.३८.१५१ )

प्राचीन समाज त्यांच्या देवदेवतांना अलौकिक प्राणी मानत होते ज्यांनी विश्वाचे नियंत्रण केले आणि मानवतेची सेवा करण्यासाठी निर्मिती केली, बहुतेकदा ते मानवी व्यवहारात हस्तक्षेप करत असत. म्हणून, त्यांना आवाहन आणि अर्पणांनी संतुष्ट करावे लागत असे, सहसा मानवतेच्या वतीने मध्यस्थी करण्याची क्षमता असलेल्या प्रतिभावान व्यक्तींकडून, ज्यामुळे दैवी व्यक्ती त्यांच्याद्वारे प्रवेश करू शकतील आणि बोलू शकतील. असे मध्यस्थ नेहमीच दैवी आणि सांसारिक यांच्यातील इंटरफेसवर अस्तित्वात राहिले आहेत. राजे आणि सरदार देखील या दैवी प्रेरित माध्यमांपेक्षा दुय्यम होते, ज्यांनी गर्भधारणेपासून मृत्यूपर्यंत आणि त्यानंतर प्रत्येक व्यक्तीच्या नशिबात महत्त्वाची भूमिका बजावली.

मातृत्वाच्या काळजीच्या देवीचे प्रतिनिधित्व करणाऱ्या किंवा तिला मूर्त स्वरूप देणाऱ्या सुईणी सर्वात शक्तिशाली होत्या, ज्या यौवन, विवाह आणि बाळंतपणात लोकांना मार्गदर्शन करत होत्या. प्राचीन ग्रीसमध्ये, ज्या महिलांनी ही भूमिका घेतली होती त्या प्लीएडियन अप्सरा माईयाशी संबंधित होत्या, ज्याचे नाव गैया , पृथ्वी माता असे बदलले जात असे . माईया, किंवा मम्मे , दाई किंवा परिचारिका या ग्रीक शब्दासाठी वापरला जाणारा शब्द, समाजातील सर्वात महत्वाचा, आदरणीय आणि भयभीत व्यक्ती होता कारण ती जीवन, मृत्यू आणि अगदी नवजात बाळाच्या लिंगावरही नियंत्रण ठेवत असे. [10] बहुतेक लोकांच्या आयुष्याच्या सुरुवातीला आणि शेवटी आणि त्यामधील आनंद आणि दुःखाच्या असंख्य क्षणांमध्ये ती उपस्थित होती. यासाठी, तिला आदर आणि तिरस्कार केला जात असे, जेव्हा देव इच्छित परिणाम देत असत तेव्हा पहिला, जेव्हा त्यांनी तो दिला नाही तेव्हा दुसरा.

बहुतेक लोकांच्या आयुष्याच्या सुरुवातीला आणि शेवटी आणि त्या दोघांमधील आनंद आणि दुःखाच्या असंख्य क्षणांमध्ये ती उपस्थित होती.
बाळंतपणाची सर्वात जुनी ग्रीक देवी एलिथियिया होती, ज्याचा पंथ कांस्य युगाच्या शेवटी क्रेटमधील अम्नीसोस येथील तिच्या गुहेच्या अभयारण्यात आढळतो. ग्रीक पुराणकथेनुसार, लेटोच्या दासींनी एलिथियियाला डेलोस येथे बोलावले होते जेणेकरून तिने आर्टेमिस आणि अपोलोला जन्म देताना तिच्या प्रसूती वेदना कमी होतील. दैवी सुईणीचा पंथ संपूर्ण ग्रीस आणि बेटांवर व्यापक होता, सामान्यत: दुर्गम खडकांच्या आश्रयस्थानांमध्ये आणि गर्भाशयांसारख्या गुहांमध्ये पाळला जात असे जिथे लोक मदत मिळविण्यासाठी आणि श्रद्धांजली वाहण्यासाठी प्रवास करत असत. केरोसमधील कावोस येथील सायक्लॅडिक देवीसाठी असलेल्या अभयारण्याची जागा समुद्राकडे तोंड असलेल्या कड्यावर खडकांच्या आश्रयस्थानांसह दुर्गम ठिकाणी चांगली काम करते.

या पूर्ण आकाराच्या आकृत्या केरोसमधील या देवीच्या मंदिरातील प्रतिमा असू शकतात, तर लहान, अधिक पोर्टेबल महिला आकृत्या माइयांनी सूर्यकिरणांनी आणि त्यांच्या धार्मिक विधींमध्ये वापरल्या जाणाऱ्या इतर शक्तींनी भरलेल्या आकर्षण असू शकतात. महिला आकृत्यांचे प्राबल्य सुरुवातीच्या चक्रीय समाजात माइयांचे श्रेष्ठत्व दर्शवते. पुरुष आकृत्या त्यांच्या पुरुष समकक्षांच्या असू शकतात, ज्यात संगीतकार आणि बार्ड्सचा समावेश आहे जे त्यांच्या संगीताच्या पुरूष देवाला, प्रागैतिहासिक अपोलोला, त्यांच्या देवांसाठी आणि शिकारी-योद्ध्यांना गाणी आणि स्तोत्रे गाण्यासाठी वापरतात जे शिकार आणि युद्धाच्या त्यांच्या स्वतःच्या देवांना मूर्त रूप देतात. मादी स्तन आणि पुरुषाचे जननेंद्रिय दोन्ही दर्शविणाऱ्या आकृत्या शमन पद्धतींमध्ये "तृतीय लिंग" ची आठवण करून देतात ज्यामध्ये मध्यस्थ विधी आणि समारंभांमध्ये ते मूर्त रूप देणाऱ्या दैवी प्राण्यांच्या स्त्री आणि पुरुष दोन्ही पैलूंचा समावेश करतात. [11]

राखाडी पार्श्वभूमीवर हात ओलांडलेली नग्न दगडी चक्रीय आकृती.
संगमरवरी पुरुष आकृती , २४००-२३०० ईसापूर्व किंवा नंतर. सुरुवातीचा चक्रीय दुसरा. संगमरवरी, उंची १४ १/८ इंच (३५.९ सेमी). द मेट्रोपॉलिटन म्युझियम ऑफ आर्ट, न्यू यॉर्क, न्यू यॉर्क (१९७२.११८.१०३)

जन्मजात गुणांसह जन्माला आलेल्या व्यक्ती ज्या त्यांना दोन्ही लिंगांना मूर्त रूप देण्यास अनुमती देतात त्यांनी ही भूमिका स्वीकारली असती. प्राचीन ग्रीक लोकांनी हे अप्सरा साल्मासिस आणि हर्मेसचा मुलगा हर्माफ्रोडाइटस, जो दृश्यमान आणि अदृश्य जगांमध्ये मध्यस्थी करतो आणि एफ्रोडाईट यांच्या पौराणिक मिलनातून स्पष्ट केले. प्लेटोच्या सिम्पोजियममध्ये आदर्श असलेल्या लिंगांचे हे विलीनीकरण प्राचीन ग्रीक आणि रोमन कलेत एक लोकप्रिय विषय होता. आधुनिक वैद्यकशास्त्र मुख्यत्वे इंटरसेक्स, स्यूडोहर्मॅफ्रोडिझम आणि हर्माफ्रोडिझमचे श्रेय एंडोगॅमस संबंधांमध्ये सामान्य असलेल्या संगतीला देते. [12] प्राचीन डीएनएच्या अलीकडील विश्लेषणांनी सुरुवातीच्या एजियन समाजांमध्ये एंडोगॅमीची इतकी उच्च वारंवारता दर्शविली आहे की आपण एजियन कलेत आणखी अनेक प्रतिनिधित्व पाहण्याची अपेक्षा करू शकतो. [13]

सुरुवातीच्या चक्रीय स्मशानभूमींच्या नियंत्रित उत्खननातून असे दिसून आले आहे की संगमरवरी मूर्ती लोकसंख्येच्या अगदी कमी टक्के लोकांकडे होत्या, त्यापैकी काहींकडे अनेक नमुने होते, तर बहुतेकांकडे एकही नव्हती. मूर्तींची मालकी आणि काहींची अनेक वेळा दुरुस्ती करण्यात आली यावरून असे दिसून येते की ज्या काही व्यक्तींच्या मालकीचे होते त्यांनी त्यांना पूर्ण ठेवले आणि त्यांच्या आयुष्यात पुन्हा रंगवले आणि नंतर, काही प्रकरणांमध्ये, त्यांच्यासोबत पुरण्यात आले. काही कबरींमध्ये रंगद्रव्ये असलेले लहान भांडे आणि वाट्या देखील होत्या ज्यांचा वापर जीवनात आणि नंतरच्या जीवनात मानवांना रंगविण्यासाठी किंवा टॅटू करण्यासाठी केला जाऊ शकतो. [14] संगमरवरी मूर्तींचे घोटे, गुडघे, कंबर किंवा छाती आणि मान येथे पद्धतशीरपणे तुकडे करणे ही सामान्य पद्धत होती, कदाचित त्यांचा प्रकाश किंवा सार पसरला जाईल आणि त्यात पुन्हा प्रवेश करू शकणार नाही याची खात्री करण्यासाठी. मूर्तीची अशी "हत्या" त्यांच्या मालकाच्या अवताराशी जुळली असावी, कारण बहुतेकदा आकृतीचे फक्त तुकडेच दफन केले जातात. पण केरोसमधील कावोस येथील अभयारण्यातही हीच प्रथा होती, त्यामुळे या मूर्ती तिथे ठेवल्या गेल्यावर, कदाचित एखाद्या विशिष्ट विधी किंवा उत्सवाच्या समाप्तीच्या वेळी, त्यांना शक्तीहीन करण्याची अधिक जटिल कारणे असू शकतात.

या सुरुवातीच्या चक्रीय व्यक्ती कोण होत्या? मला वाटते की आपण त्यांच्या सामान्य प्रतिमाशास्त्र, संगमरवरी रचना आणि प्रजनन, बाळंतपण आणि पुनर्जन्माच्या सुरुवातीच्या पंथात वापराच्या वारंवारतेसह एकत्रित केलेल्या विविध कलाकृतींकडे पाहत आहोत. प्राचीन इजिप्तच्या पहिल्या मध्यवर्ती काळाच्या [15] बरोबर सुमारे दोन शतकांच्या अत्यंत शुष्कतेच्या काळात कावोस येथील अभयारण्य कार्यरत राहिले नाही; या हवामान घटनेने संपूर्ण भूमध्यसागरीय भागात लोकसंख्या हालचाली आणि घट होण्यास हातभार लावला असावा जोपर्यंत पाऊस हिवाळा परत आला आणि पुन्हा विपुलता आली. तोपर्यंत, चक्रीय लोकसंख्येमध्ये बदल झाला होता आणि केरोस पंथ केंद्र एक दूरची आठवण होती. उरलेल्या सर्व कलाकृती म्हणजे त्या काळातील या भावनिक प्रतिमा आहेत जेव्हा लोक जन्म, गाणे, मृत्यू आणि पुनर्जन्म अस्तित्वाचे कधीही न संपणारे चक्र म्हणून साजरे करण्यासाठी एकत्र आले असावेत.

नोट्स
[१] थ्युसीडाइड्स, पेलोपोनेशियन युद्धाचा इतिहास , पुस्तक 1, धडा 4.

[२] अर्नॉट, रॉबर्ट, "आयओएस फॉर्मरली इन द फिनले कलेक्शनमधील सायक्लॅडिक ऑब्जेक्ट्स." BSA 85, 1990, pp. 1-14.

[३] कौबेट, ॲनी, पॅट गेट्झ-जेंटल आणि मारिएल पिक, "ट्रॉइस फिगर सायक्लॅडिक्स एन मार्बरे डू IIIe मिलेनियर." Revue de la Bibliothèque Nationale de France n° 45 2013, pp. 67–73.

[४] पेरोट, जी. आणि चिपीझ, सी., हिस्टोइर डी ल'आर्ट डॅन्स ल'अँटीक्विट, व्हॉल. vi: La Grèce primitive, l'art mycénien , Paris, 1894. 180.

[5] Sotirakopoulou, Peggy, The “Keros Hoard:” मिथक की वास्तव? एका कोड्याचे हरवलेले तुकडे शोधत आहे , अथेन्स: एनपी गौलांड्रिस फाउंडेशन - म्युझियम ऑफ सायक्लॅडिक आर्ट, २००५, पृ. ७१-२.

[६] ग्रेव्हज, रॉबर्ट, द व्हाईट गॉडेस: अ हिस्टॉरिकल ग्रामर ऑफ पोएटिक मिथ , क्रिएटिव्ह एज प्रेस, न्यू यॉर्क, १९४८. हे देखील पहा न्यूमन, एरिच, द ग्रेट मदर: अ‍ॅन अ‍ॅनालिसिस ऑफ द आर्केटाइप, पॅन्थिऑन, १९५५.

[७] गिम्बुटास, मारिजा, द गॉड्स अँड गॉडेसेस ऑफ ओल्ड युरोप ७०००-३५०० बीसी मिथ्स, लेजेंड्स अँड कल्ट इमेजेस . लंडन, थेम्स अँड हडसन, १९७४.

[८] मर्टेन्स, जोन आर. “सम लॉन्ग थॉट्स ऑन अर्ली सायक्लॅडिक स्कल्पचर,”  मेट्रोपॉलिटन म्युझियम जर्नल ३३ (१९९८), ७-२२. हे आकडे मेसोपोटेमियामधील अर्ली डायनेस्टिक पिरियडशी समकालीन आहेत, सुमारे. २९००-२३५० ईसापूर्व, जेव्हा उरुकच्या एका महान राजाच्या कारनाम्यांनी गिलगामेशच्या महाकाव्याचा आधार मिळवला असता, जो प्रवासी बार्ड्स प्राचीन जवळच्या पूर्वेकडील आणि त्यापलीकडे गायत असत.

[९] रेनफ्रू सी., ओ. फिलानिओटो, एन. ब्रॉडी, जी. गव्हालास आणि एमजे बॉयड (संपादक) द सॅन्चुअरी ऑन केरोस अँड द ओरिजिन ऑफ एजियन रिचुअल प्रॅक्टिस: द एक्सकॅव्हेशन्स ऑफ २००६-२००८, खंड II: कावोस अँड द स्पेशल डिपॉझिट्स . (मॅकडोनाल्ड इन्स्टिट्यूट मोनोग्राफ्स) केंब्रिज: मॅकडोनाल्ड इन्स्टिट्यूट फॉर आर्कियोलॉजिकल रिसर्च, २०१५.

[१०] झिमरमन कुओनी, बारबरा सिमोन, मिडवाइव्हज ऑफ एलिथियिया. प्रागैतिहासिक क्रेटमध्ये महिला उपचार परंपरा ट्रेसिंग , पीएचडी थीसिस, ट्रिनिटी कॉलेज डब्लिन, २०१९.

[११] व्हिव्हेरोस डी कॅस्ट्रो, एडुआर्डो, २०१५. रिलेटिव्ह नेटिव्ह. स्वदेशी संकल्पनात्मक जगांवर निबंध . HAU बुक्स, शिकागो, २०१५, २५२.

[१२] बाशांबू, अनु आणि केन मॅकएलरेव्ही, “सेक्स डेव्हलपमेंटचे संगत आणि विकार,” मानवी आनुवंशिकता २०१४, ७७, पृ. १०८–११७.

[१३] स्कॉर्टानियोटी, एरिनी आणि इतर, “प्राचीन डीएनए प्रागैतिहासिक एजियनमध्ये मिश्रणाचा इतिहास आणि अंतःविवाह प्रकट करते,” निसर्ग पर्यावरणशास्त्र आणि उत्क्रांती ७(२), २०२३, १–१४.

[१४] हेंड्रिक्स, एलिझाबेथ ए. “पेंटेड अर्ली सायक्लॅडिक फिगर: एन एक्सप्लोरेशन ऑफ कॉन्टेक्स्ट अँड अर्थ,” हेस्पेरिया ७२, २००३, पृ. ४०५–४६.

[१५] मोनिका बिनी आणि इतर, “द ४.२ केबीपी इव्हेंट इन द मेडिटेरेनियन रिजन: एन ओव्हरव्यू,”  क्लायमेट ऑफ द पास्ट१५, २०१९, पृ. ५५५–५७७.

पुढील वाचन
गेट्झ-प्रेझिओसी, पॅट, अर्ली सायक्लॅडिक स्कल्पचर: एक परिचय . रेव्ह. एड. मालिबू, कॅलिफोर्निया: गेटी म्युझियम, १९९४.

गेट्झ-जेंटल, पॅट, पर्सनल स्टाइल इन अर्ली सायक्लॅडिक स्कल्पचर , मॅडिसन: युनिव्हर्सिटी ऑफ विस्कॉन्सिन प्रेस, २००१.

ग्रेव्हज, रॉबर्ट, द व्हाईट देवी: अ हिस्टॉरिकल ग्रामर ऑफ पोएटिक मिथ , न्यू यॉर्क: क्रिएटिव्ह एज प्रेस. १९४८.

मार्थारी, मारिसा, कॉलिन रेनफ्रू आणि मायकेल बॉयड (संपादने) अर्ली सायक्लॅडिक स्कल्पचर इन कॉन्टेक्स्ट , (अथेन्स येथील आर्कियोलॉजिकल सोसायटी येथे आयोजित एका संगोष्ठीत पेपर्स सादर केले, २७-९ मे, २०१४). ऑक्सफर्ड: ऑक्सबो. २०१७.

रेनफ्रू, सी. आणि इतर, “एजियन अर्ली ब्रॉन्झ एजमधील केरोस येथील अभयारण्य: मंडळीच्या केंद्रापासून शक्तीच्या केंद्रापर्यंत,”  जर्नल ऑफ ग्रीक आर्कियोलॉजी ७, २०२२, पृष्ठ १-३६.

 जुनापानी येथील दगडी वर्तुळे ही महाराष्ट्र राज्यातील नागपूरजवळील जुनापानी येथे प्रागैतिहासिक मेगालिथिक वर्तुळे आहेत . जुनापानीभोवती अशी सुमारे ३०० दगडी वर्तुळे आढळतात. [ १ ] १८७९ मध्ये जे.एच. रिवेट-कार्नाक यांनी प्रथम त्यांचे उत्खनन केले होते, त्यातून खंजीर, क्रॉस-रिंग फास्टनर्ससह सपाट कुऱ्हाडी , कुबड्या, अंगठ्या, बांगड्या, घोड्याचे तुकडे, लांब ब्लेड असलेल्या छिन्नी आणि टोकदार चिमटे, कदाचित लाकडी हँडलने झाकलेले असतील अशा विविध लोखंडी वस्तू आढळल्या. [ १ ] काळ्या आणि लाल मातीच्या भांड्यांचे पुरावे देखील आहेत, जसे की काळ्या रंगात रेषीय चित्रे असलेले वाट्या. [ २ ] दफनभूमी केर्न्सने वैशिष्ट्यीकृत होती . सुमारे १५० दगडी वर्तुळांचा अभ्यास आणि दस्तऐवजीकरण करण्यात आले आहे. एक उल्लेखनीय वैशिष्ट्य म्हणजे वर्तुळांमधील कप-चिन्हांकित दगड जे खगोलीय महत्त्व दर्शवितात. कप-चिन्हांकित दगड विशिष्ट दिशा दर्शविणाऱ्या विशिष्ट ठिकाणी निश्चित केले आहेत यावरून हा पैलू ओळखला गेला आहे. [ ३ ]
जुनापानीचे दगडी वर्तुळ
मूळ नाव
जुनापाणी येथील शिळावर्तुळे  ( मराठी )

जुनापानी येथील दगडी वर्तुळ
स्थान जिल्हा नागपूर , महाराष्ट्र .
निर्देशांक २१°११'४९"उत्तर ७८°५९'५६"पूर्व
नियामक मंडळ भारतीय पुरातत्व सर्वेक्षण

जुनापानी येथील दगडी वर्तुळे महाराष्ट्रात आहेत.
जुनापानीचे दगडी वर्तुळ
महाराष्ट्रातील जुनापानी येथील दगडी वर्तुळांचे स्थान
या वास्तूंना भारतीय पुरातत्व सर्वेक्षण (ASI) ने राष्ट्रीय महत्त्वाची स्मारके म्हणून नियुक्त केले आहे. [ 4 ] १९६२ मध्ये ASI ने या जागेचे उत्खनन केले ज्यामध्ये तीन दगडी वर्तुळे सापडली. [ 1 ] टाटा इन्स्टिट्यूट ऑफ फंडामेंटल रिसर्च (TIFR) ने अतिरिक्त अभ्यासांना निधी दिला आहे.

सामग्री





भूगोल

स्टोन सर्कलचे आणखी एक दृश्य
जुनापानी येथील दगडी वर्तुळे ही एक निर्जन दफनभूमी आहे जिथे मृतांचे अवशेष असलेले सेपल्क्रल मेगालिथ आहेत. हे मध्य भारतातील नागपूर शहराच्या वायव्येस सुमारे १० किलोमीटर (६.२ मैल) अंतरावर, विदर्भ प्रदेशात एका लहानशा भागात आढळतात. ते बऱ्यापैकी मोठे आकाराचे आहेत, गुगल अर्थवर दिसतात आणि नद्यांच्या काठाजवळ गटबद्ध आहेत. [ 5 ] हे काटोलच्या महामार्गावर स्थित आहे आणि मध्य भारतातील मेगालिथ वितरणाच्या उत्तरेकडील कडा बनवते. [ 6 ]

इतिहास
या प्रदेशात मानवी वस्ती १००० ईसापूर्व पासूनची आहे आणि आजही अस्तित्वात आहे. हा परिसर भारताच्या वायव्य कॉरिडॉरचा एक महत्त्वाचा भाग होता. येथे सापडलेले मेगालिथ १००० ईसापूर्व ते ३०० ईसापूर्व पर्यंतचे आहेत. [ उद्धरण आवश्यक आहे ] हे मूल्यांकन मेगालिथिक काळातील सेपल्क्रलमधून सापडलेल्या अनेक पुरातन वस्तूंवर आधारित आहे. येथे सापडलेली लोखंडी अवजारे सुमारे १००० ईसापूर्व काळ दर्शवितात. वेगवेगळ्या कुळांच्या स्थानिक समुदायांनी त्यांची ओळख पटवली आहे. या वर्तुळांमध्ये आढळणारी एक विशिष्ट वैशिष्ट्य म्हणजे कप चिन्हांसह दगडांची स्थापना. असा अंदाज आहे की या वर्तुळांचा दक्षिण भारतातील मेनहिर , डोल्मेन आणि इतर नॉन-सेपल्क्रल आणि सेपल्क्रल मेगालिथिक संरचनांशी काहीही संबंध नाही . [ ५ ] १८७९ मध्ये जुनापानीच्या दगडी वर्तुळांच्या उत्खननाचा अहवाल देणारे रिवेट कार्नाक हे पहिले होते. [ ७ ]

जुनापानी हे दुसरे सर्वात मोठे स्थळ आहे, नागपूर प्रदेशातील ५१ स्थळांपैकी १५० मेगालिथिक काळातील दगडी वर्तुळे आणि ८९ विदर्भ प्रदेशात आहेत. १९६१ मध्ये बी.के. थापर या स्थळाच्या उत्खननात सहभागी होते. सुरुवातीला, तीन दगडी वर्तुळे सापडली ज्यापैकी दोन वर्तुळांमध्ये अंत्यसंस्काराच्या वस्तूंशी संबंधित मानवी अवशेष आढळले; इक्विडे (घोडा) कुटुंबातील प्राण्यांचा सांगाडा देखील सापडला. या उत्खननादरम्यान, दगडी वर्तुळांमध्ये फक्त कप-चिन्ह असलेले दगड आढळले. विशिष्ट अभिमुखतेसह निश्चित केलेल्या या कप चिन्हांचे महत्त्व स्थापित करण्यासाठी, टीआयएफआरने या दगडी वर्तुळांचा खगोलशास्त्र किंवा परिसरातील लोकांच्या विश्वविज्ञानाशी काही संबंध आहे का हे स्थापित करण्यासाठी अभ्यास सुरू केला. [ 5 ]

पुरातत्वीय शोध

स्टोन सर्कलमधील एका दगडाचे जवळून दृश्य

अलिकडच्या काळात दगडी वर्तुळांमधील कोंबडीची पिसे तांत्रिक उपासनेचे सूचक आहेत.
या मेगालिथिक दफनभूमीवरील अंत्यसंस्कारातील पुरातन वस्तू लाल रंगाच्या मातीच्या भांड्यांवर (काही मेगालिथिक ग्राफिटी चिन्हांसह ), अभ्रक लाल आणि खडबडीत लाल भांडी रंगवलेल्या आहेत. हे शोध नागपूरच्या पश्चिमेकडील कौंडिन्यपुरा, पौनार , टाकळघाट आणि खापा या प्रदेशातील इतर ठिकाणांवरील समान शोधांशी मिळत्याजुळत्या आहेत; शेवटची दोन ठिकाणे १९६८ मध्ये कृष्णा नदीच्या दोन्ही काठांवर उत्खनन करण्यात आली होती . [ 8 ]

TIFR अभ्यासात (मॅपिंगसह) आतापर्यंत 56 दगडी वर्तुळे समाविष्ट केली गेली आहेत आणि त्यापैकी बहुतेक चांगल्या स्थितीत जतन केल्याचे आढळले आहे; ते काही मीटर व्यासाचे आहेत. यापैकी 20 वर्तुळांवर कपच्या खुणा नोंदवल्या गेल्या आहेत, ज्यापैकी सात वर्तुळांना बाजूंना खुणा आहेत. या कपच्या वर्तुळांच्या स्थानाच्या विश्लेषणातून असे लक्षात आले आहे की समांतर रेषा किंवा ऑर्थोगोनल अनुक्रम असलेले कप-खुणा सरळ रेषेत किंवा '+' चिन्ह स्वरूपात दिसतात आणि '+' चिन्ह रेषा वर्तुळाच्या आत किंवा भोवती त्रिज्या किंवा स्पर्शिकरित्या एका निश्चित अभिमुखतेसह संरेखित केल्या आहेत. सर्व कपच्या खुणामध्ये एक विशिष्ट कोनीय श्रेणी देखील नोंदवली गेली आहे, जी 3 क्लस्टर्सच्या स्वरूपात आहेत. [ 5 ]

कपच्या खुणा काही सेंटीमीटर लांबीच्या आहेत, विशेषतः दगडी वर्तुळांच्या बाजूने स्थित आहेत, ज्या त्यांना उत्तरेच्या संदर्भात विशिष्ट कोनात आकाशाकडे दिशा दर्शवितात. रेकॉर्ड केलेल्या दिशानिर्देश उत्तरेकडे ११८, २०८ आणि ३३४ अंश आहेत. विशिष्ट ताऱ्यांच्या उगवण्याच्या आणि मावळण्याच्या वेळा आणि ऋतूंमध्ये हवामानातील बदल आणि विशेषतः मान्सूनच्या मावळतीचे दर्शविण्यासाठी हे तारकीय दिशानिर्देशित असू शकतात . [ 5 ] [ 9 ]

या ठिकाणावरून इतरही अनेक शोध सापडल्याची नोंद आहे. एका वर्तुळात लोखंडी जीभ असलेली तांब्याची घंटा आढळली. [ 10 ] उत्खनन केलेल्या तीन वर्तुळांमध्ये, अंत्यसंस्काराच्या ठिकाणी चिकट काळ्या मातीचे ढीग आढळले. येथे अनेक प्रकारची लोखंडी अवजारे देखील सापडली जी या जागेच्या शीर्षकाला "लोखंड-वापर" म्हणून साक्ष देतात. [ 11 ] दगडी मुसळाचा शोध देखील आढळल्याची नोंद आहे. [ 6 ] बी.के. थापर यांना येथे मध्य पाषाणयुगीन अवजारे सापडली . [ 12 ]

संदर्भ

घोष १९९० , पृ. १२०–१२१

देव १९८५ , पृष्ठ २५

"भारतीय संदर्भात पुरातत्व खगोलशास्त्र: जमशेदजी टाटा ट्रस्टने निधी दिलेला टाटा इन्स्टिट्यूट ऑफ फंडामेंटल रिसर्चचा कार्यक्रम डिसेंबर २००६ ते डिसेंबर २०१० पर्यंतच्या निकालांचे ठळक मुद्दे" (पीडीएफ) . टाटा इन्स्टिट्यूट ऑफ फंडामेंटल रिसर्च . १० फेब्रुवारी २०१३ रोजी पुनर्प्राप्त .

"औरंगाबाद सर्कल, महाराष्ट्र" . भारतीय पुरातत्व सर्वेक्षण . २४ सप्टेंबर २०१२ रोजी पुनर्प्राप्त .

"प्राचीन भारतातील मेगालिथ आणि खगोलशास्त्राशी त्यांचे संभाव्य संबंध1" (पीडीएफ) . 3. जुनापानीचा एक विशेष प्रकार . टाटा इन्स्टिट्यूट ऑफ फंडामेंटल रिसर्च (TIFR) . 10 फेब्रुवारी 2013 रोजी पुनर्प्राप्त .

प्रसाद साहू, भैरबी (१ जानेवारी १९८८). शिकारींपासून प्रजननकर्त्यांपर्यंत: प्राण्याची पार्श्वभूमी सुरुवातीच्या भारतातील . अनामिका प्रकाशन. पृष्ठे २५१–. ISBN  ९७८-८१-८५१५०-०६-२. ७ फेब्रुवारी २०१३ रोजी पुनर्प्राप्त .

मूर्ती, एमएलके (१ जानेवारी २००३). आंध्र प्रदेशचा व्यापक इतिहास आणि संस्कृती: पूर्व आणि प्रोटोहिस्टोरिक आंध्र प्रदेश ५०० ईसापूर्व पर्यंत . ओरिएंट ब्लॅकस्वान. पृष्ठे १०८–. ISBN  ९७८-८१-२५०-२४७५-०. ७ फेब्रुवारी २०१३ रोजी पुनर्प्राप्त .

सांकलिया, हसमुख धीरजलाल; देव, शांताराम भालचंद्र; ढवळीकर, मधुकर केशव (1985). भारतीय पुरातत्वशास्त्रातील अभ्यास: प्रोफेसर एचडी सांकलिया सत्कार खंड . लोकप्रिय प्रकाशन. pp. 26–. ISBN  ९७८-०-८६१३२-०८८-२. ७ फेब्रुवारी २०१३ रोजी पुनर्प्राप्त .

वाहिया, एमएन "भारतातील मेगालिथ आणि खगोलशास्त्राशी त्यांचा संभाव्य संबंध" (पीडीएफ) . मौखिक पेपर्सचे सारांश . आयसीओए-वेबसाइट. पृष्ठ 8. 10 फेब्रुवारी 2013 रोजी पुनर्प्राप्त .

इंडियन अँटिक्वेरी . पॉप्युलर प्रकाशन. १९७० . ७ फेब्रुवारी २०१३ रोजी पुनर्प्राप्त .

नारायण, अवध के. (१९६८). उत्तर भारतातील स्थानिक नाण्यांवरील सेमिनार पेपर्स, इ.स.पूर्व ३०० ते इ.स.पूर्व ३०० संपादक: ए.के. नारायण, जेपी सिंग आणि निसार अहमद यांच्या सहाय्याने . प्राचीन भारतीय इतिहास, संस्कृती आणि पुरातत्व विभाग, इंडोलॉजी कॉलेज, बनारस हिंदू विद्यापीठ . ७ फेब्रुवारी २०१३ रोजी पुनर्प्राप्त .

भारत. पुरातत्व विभाग (१९६४). भारतीय पुरातत्व . भारतीय पुरातत्व सर्वेक्षण . ७ फेब्रुवारी २०१३ रोजी पुनर्प्राप्त .
संदर्भग्रंथ
 
मेगालिथ
विषय क्षेत्रात: सामाजिक विज्ञान

मेगालिथ म्हणजे प्राचीन सांस्कृतिक भूदृश्यांमध्ये उभारलेले मोठे दगडी स्मारक, जे सामुदायिक क्रियाकलाप आणि दफन पद्धतींचे महत्त्वपूर्ण चिन्हक म्हणून काम करतात, जे मृत व्यक्तींचे जिवंत समुदायाच्या सामाजिक रचनेत एकात्मता प्रतिबिंबित करतात.

एआयने तयार केलेली व्याख्या यावर आधारित: पुरातत्व विश्वकोश (दुसरी आवृत्ती) , २०२४


या पेजबद्दल
मेंडेलीमध्ये जोडा
अलर्ट सेट करा
इतर विषय शोधा
या पानावर
व्याख्या
प्रकरणे आणि लेख
संबंधित अटी
शिफारस केलेले प्रकाशने
प्रकरणे आणि लेख
तुम्हाला हे प्रकरणे आणि लेख या विषयाशी संबंधित वाटतील.

प्रकरण

आशिया, दक्षिण | मेगालिथ्स
जुन्या जगात मेगालिथिक प्रथेचे वितरण आणि प्रसार
' मेगालिथ ' बद्दलची सर्वात आश्चर्यकारक गोष्ट म्हणजे जवळजवळ संपूर्ण जुन्या जगात त्यांची उपस्थिती. इंग्लंडच्या किनाऱ्यापासून ते जपानपर्यंत त्यांची उपस्थिती निःसंशयपणे एखाद्याच्या कल्पनेला आकर्षित करते आणि ती 'जागतिक घटना' म्हणून पाहिली जाऊ शकते. 'मेगालिथिक' सेपलक्रल/नॉनसेपलक्रल स्मारकांच्या वितरणाची रूपरेषा आखणे काहीसे सुरक्षित असू शकते परंतु त्यांच्या 'प्रसारावर' मते तयार करणे हे वादांच्या गर्तेवर चालण्यापेक्षा कमी नाही.

युरोपियन 'मेगालिथ' हे कालक्रमानुसार सर्वात जुने मानले जातात. तेथे आढळणारे मूलभूत थडगे प्रकार म्हणजे 'मेगालिथिक' मंदिरे (माल्टा आणि गोझोच्या भूमध्यसागरीय बेटांवर आढळतात), दफन कक्ष (डोल्मेन, पॅसेज कबरी, दरबार कबरी आणि गॅलरी कबरींमध्ये विभागलेले), एकच उभा दगड किंवा मेनहिर आणि शेवटी गटबद्ध उभे दगड, जे ओळीत किंवा लंबवर्तुळाकार श्रेणीत ठेवलेले आहेत. (शेवटचे तीन थडगे प्रकार स्पेन, पोर्तुगाल, फ्रान्स, ब्रिटन, दक्षिण स्वीडन आणि उत्तर जर्मनीमध्ये आढळतात).

पारंपारिक दृष्टिकोनांनी युरोपातील संपूर्ण 'मेगालिथिक' संकुल पूर्व भूमध्य समुद्रातून निर्माण केले आहे, जे या प्रथेचा प्रसार समुद्री लोकांद्वारे उत्तरेकडे, स्पेनमधून, पश्चिम युरोपच्या किनाऱ्यावर आणि स्कॅन्डिनेव्हियामध्ये स्थलांतरित झाल्याचे दर्शवते. नवपाषाण युगापासून कांस्य युगापर्यंत ( सुमारे 5000 ते 2000 ईसापूर्व) या प्रथेच्या प्रचलिततेचा दीर्घ कालावधी आणि लोह युगातही त्याची सातत्य लक्षात घेता, बहुतेक युरोपियन पुरातत्वशास्त्रज्ञांचा असा विश्वास आहे की हा विकास स्थानिक होता, कदाचित त्याचे वेगवेगळे स्वतंत्र केंद्र होते. तथापि, त्यापैकी बरेच जण विचारांच्या प्रसारात 'सुधारित प्रसारवाद' च्या मॅकीच्या आवृत्तीशी सहमत आहेत आणि असे मानतात की ते अटलांटिक किनाऱ्यापासून आतील भागात समुद्रकिनाऱ्यावर घडले.

'मेगालिथ'च्या दक्षिण आशियाई रंगभूमीकडे येताना, दक्षिण रशियन/कॉकेशियन (मुख्य थडग्याचा प्रकार लांब बॅरो आहे), टेपे सियाल्क चौथाचे पोर्थोल्ड सिस्ट (इराणमध्ये), फिलिस्तानच्या सर्कोफॅगस थडग्या (पॅलेस्टाईनच्या दक्षिण किनाऱ्यावर स्थित), उत्तर इथिओपियातील कुनामाच्या खडकात कोरलेल्या गुहा, मकरन किनाऱ्यावरील सिस्ट आणि दगडी वर्तुळे यासारख्या समांतरता काढल्या गेल्या आहेत ज्या प्रेरणास्थानाच्या क्षेत्रांमध्ये किंवा जिथून या 'मेगालिथिक' वैशिष्ट्यासह लोकांचे स्थलांतर झाले. उपरोक्त भागात आढळणारे मुख्य दफन प्रकार म्हणजे चेंबर थडगे आणि खड्डे मंडळे.

दक्षिण आशियामध्ये आढळणारे प्रमुख 'मेगालिथिक' कबर आणि नॉनसेपल्चरल स्मारक म्हणजे खड्डे मंडळे, चेंबर थडगे, कलश दफन आणि मोनोलिथिक सरळ स्लॅब (एकल किंवा रांगेत). तथापि, कालक्रमानुसार अडचणी असूनही, मागील परिच्छेदात उल्लेख केलेल्या काही प्रदेशांना 'मेगालिथिक' प्रथा पसरवण्याचे संभाव्य क्षेत्र म्हणून सूचित केले आहे. १०००  वर्षांहून अधिक काळ ( सुमारे १५०० ईसापूर्व ते ख्रिश्चन युगाच्या सुरुवातीच्या  शतकांपर्यंत) टिकून राहिलेले बहुतेक 'मेगालिथिक' दफन निश्चितच दक्षिण आशियातील लोहयुग समुदायांशी संबंधित आहेत. आधी नमूद केल्याप्रमाणे, या प्रथेच्या प्रसारासाठी संभाव्य मार्ग म्हणून जमिनीवरून किंवा समुद्रातून येणारे 'सांस्कृतिक आवेग' हे शैक्षणिक वर्तुळात मानले गेले आहेत.

येथे आशियातील विविध प्रकारच्या थडग्यांचे देखील लक्षात घेता येईल जे जपान, कोरिया , चीन, इंडोनेशिया, मलेशिया आणि इंडो-पॅसिफिक प्रदेशातील इतर भागांमध्ये पसरलेले आहेत. 'मेगालिथ'चे मुख्य प्रकार म्हणजे मेनहिर (उभे दगड), डोल्मेन (दोन दगडी खांबांवर विसावलेले सपाट दगड), दगडी आसन, पायऱ्या असलेले दगडी पिरॅमिड, विविध प्रकारचे दगडी थडगे आणि सारकोफॅगी. 'मेगालिथिक' प्रथेचा प्रसार येथे उत्तरार्धातील नवपाषाणापासून लोहयुगापर्यंत नोंदवला गेला आहे. काहीही असो, ते युरोपियन आणि दक्षिण आशियाई 'मेगालिथ' पेक्षा कालक्रमानुसार खूप नंतरचे आहेत, कारण ते पहिल्या सहस्राब्दी बीसीच्या मध्य शतकातील आहेत.

अजून दाखवा
संदर्भ कार्य
पुरातत्वशास्त्राचा विश्वकोश
२००८ , पुरातत्वशास्त्राचा विश्वकोश
यूएस मुर्ती
लेखाचे पुनरावलोकन करा

महान मेंगा डोल्मेन (मालागा, स्पेन) यांचे प्रागैतिहासिक अभियांत्रिकी आणि खगोलशास्त्र. एक भौमितिक आणि भू-पुरातत्व विश्लेषण
१ परिचय
मेगालिथिक स्मारकांचा उदय हा एक संपूर्ण युरोपियन घटना आहे जो शेतकरी आणि पशुपालकांच्या सुरुवातीच्या समुदायांमध्ये उद्भवला. त्याचे सर्वात उल्लेखनीय अभिव्यक्ती 6 व्या आणि 5 व्या सहस्राब्दी दरम्यान दिसून आल्या. मोठ्या स्मारकांच्या विकासासह, ज्यासाठी अनेकदा व्यापक कामगार शक्तीची जमवाजमव तसेच पूर्वी न पाहिलेले अभियांत्रिकी आणि स्थापत्य ज्ञान तैनात करणे आवश्यक होते. दक्षिण इबेरियन द्वीपकल्पात, विशेषतः स्पेनमध्ये, 19 व्या शतकाच्या उत्तरार्धापासून विविध प्रकारचे मेगालिथ आहेत ज्यांचा शोध घेण्यात आला आहे. सर्वात प्रसिद्ध स्थळांमध्ये सोटो (ट्रिगुएरोस, हुएल्वा), हुएर्टा मोंटेरो (बाडाजोझ) आणि अल्बेराइट (विलामार्टिन, काडिझ) सारख्या वैयक्तिक स्मारकांचा समावेश आहे. व्हॅलेन्सिना डे ला कॉन्सेपसीओन (सेव्हिल), आणि लॉस मिलरेस (अल्मेरिया) सारख्या वसाहतींशी संबंधित स्मारकांचे जटिल समूह तसेच गोराफे (ग्रॅनाडा) किंवा एल पोझुएलो (हुएल्वा) सारखे विस्तृत मेगालिथिक लँडस्केप समाविष्ट आहेत. (इंग्रजीमधील अलीकडील पुनरावलोकनांसाठी, अगुआयो डी होयोस आणि गार्सिया-संजुआन, 2002; गार्सिया-संजुआन आणि रुझ गोन्झालेझ, 2009; व्हीटली एट अल., 2010 पहा ). या सर्वांपैकी, एंटेक्वेरा मेगालिथिक कॉम्प्लेक्स कदाचित सर्वात विलक्षण आहे.

अँटेकेरा मेगालिथिक कॉम्प्लेक्समध्ये मेंगा आणि व्हिएरा डोल्मेन्स आणि एल रोमेरल थोलोस यांचा समावेश आहे. या तीन स्मारकांपैकी प्रमुख, मेंगा हे मेगालिथिक घटनेच्या जगातील सर्वात महत्त्वपूर्ण अभिव्यक्तींपैकी एक मानले जाऊ शकते, ज्याचा संशोधनाचा दीर्घ इतिहास आहे.

16 व्या शतकात सर्वात जुने लिखित संदर्भ दिसले जेव्हा मालागाचे बिशप सीझर रिकारियो यांनी 1530 मध्ये स्वाक्षरी केलेल्या दस्तऐवजात “मेंगाच्या गुहा” बद्दल लिहिले होते. त्यानंतर, 16व्या ते 18व्या शतकापर्यंतचे इतर संदर्भ अँटेक्वेरा च्या इतिहासाविषयी वेगवेगळ्या हस्तलिखितांमध्ये दिसले, जसे की P78 मधील Notequera. 1609 मध्ये अलोन्सो गार्सिया डी येग्रोस, 17 व्या शतकाच्या सुरूवातीस फ्रान्सिस्को डी तेजाडा वाय नाव्हा आणि फ्रान्सिस्को डी कॅब्रेरा आणि 1675 मध्ये रॉड्रिगो मेंडेझ डी सिल्वा ( एस्कॅलेंट जिमेनेझ आणि फर्नांडेझ परादास, 2003 ). १९ व्या शतकात या मेगालिथिक स्मारकाचे संदर्भ वाढले (अलीकडील पुनरावलोकनांसाठी, सांचेझ-कुएन्का लोपेझ, २०१२; गार्सिया-सांजुआन आणि लोझानो, २०१४ आणि त्यातील संदर्भ पहा).

तथापि, संशोधनाचा इतका मोठा इतिहास असूनही, मेंगा डोल्मेनच्या स्थापत्य रचनेचा अभ्यास कधीही व्यापक अभियांत्रिकी दृष्टिकोनातून केला गेला नाही जो त्याच्या बांधकाम साहित्याचे, परिमाणांचे आणि भूमितीचे विश्लेषण करतो. सध्याचा अभ्यास हा दृष्टिकोन अनुसरतो, जो पद्धतशीर भू-पुरातत्व, पुरातत्वमितीय आणि सांख्यिकीय विश्लेषणावर आधारित आहे, जो खाली चर्चा केल्याप्रमाणे, या असाधारण मेगालिथिक स्मारकाच्या नवीन समजुतीसाठी आधार प्रदान करतो.

जर्नल
२०१४ , जर्नल ऑफ आर्कियोलॉजिकल सायन्स
जोस अँटोनियो लोझानो , ... अँटोनियो मोर्गाडो
प्रकरण

दक्षिण आशिया, पुरातत्वशास्त्र
४.४ मेगालिथिक कॉम्प्लेक्स
दक्षिण आशियातील मेगालिथ हे अभ्यासाचे एक प्रचंड क्षेत्र आहे, जे या छोट्या सर्वेक्षणात पुरेसे समाविष्ट करणे खूप मोठे आहे. भारतीय उपखंडातील अनेक प्रदेशांमध्ये , प्रामुख्याने काश्मीर आणि अल्मोरा, विंध्य, दख्खन पठार आणि द्वीपकल्पीय भारताच्या खोल दक्षिणेकडील वायव्य पर्वतीय भागात, प्रागैतिहासिक काळापासून वस्ती स्थळांशी संबंधित मोठ्या दगडी बांधकामांचा समावेश असलेल्या दफन स्मारके ज्ञात आहेत . या परंपरेचे पैलू अजूनही उपखंडात उपस्थित असू शकतात, जसे की ईशान्येकडील नागा आणि खासी आणि छोटा नागपूर आणि बस्तर प्रदेशातील इतर जमातींमध्ये. या गुंतागुंतीच्या, खोल ऐतिहासिक संबंधांसाठी कनेक्शन अद्याप निश्चित केलेले नाहीत. पुरातत्वीय स्तरीकरण, रेडिओकार्बन तारखा आणि संबंधित साहित्याचा अभ्यास दर्शवितो की दक्षिण आशियातील मेगालिथची सुरुवात ईसापूर्व दुसऱ्या सहस्राब्दीच्या अगदी शेवटी झाली आहे आणि लोखंडाच्या मोठ्या प्रमाणात उत्पादनासह येते. द्वीपकल्पीय भारतीय मेगालिथिकशी संबंधित सर्वात जुनी लोखंडी अवजारे म्हणजे बाणांचे डोके, खंजीर आणि घरगुती भांडे. ते या सांस्कृतिक संकुल आणि त्यापूर्वीच्या दक्षिण भारतीय नवपाषाण युगातील संक्रमणकालीन काळात देखील आढळतात.

दक्षिण भारतातील मेगालिथिक दफन स्मारकांमध्ये डोल्मेनॉइड सिस्ट, स्लॅब्ड सिस्ट, उथळ-खड्डा दफन, खोल-खड्डा दफन, छत्री-दफन आणि टोपी-दफन, हुड-दफन, बहु-हुड-दफन आणि मेनहिर यांचा समावेश आहे. भारतीय उपखंडात १४०० हून अधिक मेगालिथिक स्थळे ज्ञात आहेत, त्यापैकी १११६ द्वीपकल्पीय भारतात आहेत, त्यापैकी सुमारे २४० कोणत्या ना कोणत्या प्रकारे उत्खनन करण्यात आली आहेत. यापैकी बहुतेक स्मारकांमध्ये मानवी अवशेष आणि संबंधित दफन फर्निचर आहे, कधीकधी मोठ्या प्रमाणात. घोडे आणि वाहने उपस्थित आहेत, तसेच मातीची भांडी आणि धातूच्या कलाकृती आहेत ज्यात साधने, घोड्यांचे सापळे, रोमन नाणी आणि इतर कलाकृती समाविष्ट आहेत. लोह मुबलक प्रमाणात आढळते. दफनभूमीतील मानवी अवशेषांचा अभ्यास केनेडी यांनी केला आहे ( २००० , पृ. ३२६-५७).

संदर्भ कार्य
सामाजिक आणि वर्तणुकीय विज्ञानांचा आंतरराष्ट्रीय विश्वकोश
२००१ , सामाजिक आणि वर्तणुकीय विज्ञानांचा आंतरराष्ट्रीय विश्वकोश
जीएल पॉसेहल
प्रकरण

आशिया आणि युरोप
लोहयुग आणि मेगालिथ
१४०० ईसापूर्व ते ८०० ईसापूर्व दरम्यान द्वीपकल्पात महत्त्वाचे सामाजिक आणि तांत्रिक बदल घडले. हा काळ मेगालिथिक परंपरेच्या उदयाशी संबंधित आहे, ज्यामध्ये निवडक व्यक्तींसाठी, कदाचित उच्चभ्रू लोकांसाठी प्रभावी दगडांनी बांधलेले दफन स्मारके बांधली गेली ( आकृती ९ आणि १० ). याच काळात लोह धातूशास्त्राची स्थापना झाली आणि त्यासोबतच जंगलातून खनिज संसाधने आणि कोळसा काढण्यासाठी नवीन मागणी आली. लोहकामाचे सर्वात जुने पुरावे सुमारे १२०० ईसापूर्व बुक्कासागरा येथे आहेत ( जोहानसेन, २०१९ ). मेगालिथिक दफन संरचनांचे बांधकाम प्रथम उत्तर कर्नाटक आणि पूर्व महाराष्ट्र (विदर्भ) मध्ये उदयास आले असावे. दक्षिणेत, अश्मौंड नवपाषाण परंपरेपासून मेगालिथिक परंपरेत स्पष्ट सातत्य आहे. तथापि, महाराष्ट्रात, राज्याच्या पश्चिमेकडील चाल्कोलिथिक गावांची ठिकाणे मोठ्या प्रमाणात सोडून दिलेली दिसतात, तर पूर्वेला मेगालिथिक दफनभूमींसोबत नवीन गावांची ठिकाणे उदयास आली.


पूर्ण आकाराची प्रतिमा डाउनलोड करण्यासाठी साइन इन करा.
आकृती ९ . दख्खनमधील मेगालिथिक थडग्यांच्या प्रकारांची उदाहरणे. (अ) नागपूरजवळील केर्न सर्कल ( रिव्हेट-कार्नाक, १८७९ ); (ब) पालघाट गॅप, नीलगिरी टेकड्यांवरील छत्री-दगड (टोपी-कल) प्रकार ( बॅबिंग्टन, १८२३ ); (क) कर्नाटकातील शोरापूर, जेवुर्गी येथे उत्खनन केलेल्या केर्न सर्कलचा विभाग ( मीडोज टेलर, १८७३ ); (ड) कर्नाटकातील शोरापूर, राजुनकोल्लूर जवळील पोर्थोल सिस्ट (किंवा "क्रोमलेच") प्रकार ( मीडोज टेलर, १८७३ ); (इ) ब्रह्मगिरी ( व्हीलर, १९४८ ) मधील दफन सिस्टसह उत्खनन केलेल्या केर्नचा आराखडा ; (फ) बॅनर्जी (१९५६) च्या उत्खननानंतर लेश्निक (१९७४) मधील टेराकोटा सारकोफॅगीसह उत्खनन केलेल्या बोल्डर सिस्टचा आराखडा ; (G) खोदलेल्या केर्नमधून जार दफन करून विभाग ( थापर, १९५२ ).


पूर्ण आकाराची प्रतिमा डाउनलोड करण्यासाठी साइन इन करा.
आकृती १०. लोहयुगीन दक्षिण भारतीय आणि श्रीलंकेतील मेगालिथांचे फोटो. (अ) २००४ मध्ये आंध्र प्रदेशातील कुर्नूल जिल्ह्यातील पाटुपाडूजवळील मेगालिथिक स्मशानभूमीचे पृष्ठभाग; (ब) २०१० मध्ये श्रीलंकेतील यतिगलपोथ्था येथील मेगालिथिक सिस्ट.

It has been argued that the megalithic transition needs to be seen in the context of the development of political economies with new systems of wealth creation including craft production such as metals and textiles, and increasing long-distance trade (Gullapalli, 2009; Johansen, 2019). This period provides the first good evidence for “cash crops” such as cotton, flax and seasonal tree fruits. In addition, the period witnessed the spread and adoption of rice by some groups on the peninsula (Kingwell-Banham, 2019). It may only be during this period, and alongside the spread of rice agriculture, that settled agricultural communities emerged in the far South, including coastal and southern inland Tamil Nadu. In addition, rice and millet agriculture spread to the island of Sri Lanka during this period, where the earliest finds of crops so far date to the later 1st millennium BCE (Murphy et al., 2018; Kingwell-Banham et al., 2018b).

The Megalithic of South India can be best understood as a mosaic of local cultural traditions that shared overarching practices of constructing burial monuments from large stones as well as the use and production of iron tools and weapons. Earlier megaliths consisted of circles of large boulders (pit-circles), while later forms included quarried and worked stone slabs that often lined a central cist. There is a diversity of monument types, both in terms of super structure and substructure (Fig. 9; Krishnaswami, 1949; Brubaker, 2000; Mohanty and Selvakumar, 2001). Burials were often secondary, indicating that collecting and depositing defleshed bones represented the end of a long and elaborate death ritual. Bones were sometimes placed in a ceramic sarcophagus or on a bed, and were normally accompanied by quantities of ceramics as well as iron weapons. The ceramics were mostly necked jars and bowls, suggesting an association with larger scale drinking. The weapons, including swords, as well as some parts of bridles, indicate associations with a warrior ideology. Megalithic cemeteries extend to Sri Lanka and suggest agro-pastoral societies spread across most drier parts of Sri Lanka in the early 1st millennium BCE. Unfortunately, the earlier Neolithic period in Sri Lanka remains poorly understood, although pre-Iron Age ceramics (the Udupiyan Culture) have been found in various rock shelter excavations; sometimes, these are suggested to date back to 3000 BCE or even earlier (Silva and Dissanayake, 2008).

कर्नाटकातील ब्रह्मगिरी हे उत्खनन केलेले एक महत्त्वाचे मेगालिथिक स्थळ आहे जिथे मॉर्टिमर व्हीलर (१९४८) यांनी प्रथम मेगालिथिक स्थळांना स्पष्ट कालक्रमानुसार ठेवले. सापडलेल्या मेगालिथिक स्थळांची संख्या बहुतेक लोकसंख्येसाठी खूप कमी आहे आणि म्हणूनच ते उच्चभ्रूंशी संबंधित स्मारकांचे प्रतिनिधित्व करतात आणि अशा प्रकारे विस्ताराने अधिक जटिल सामाजिक पदानुक्रमांचा उदय झाला पाहिजे. सामाजिक उत्क्रांतीच्या भाषेत, अनेक विद्वानांनी असे सुचवले आहे की मेगालिथिक कालखंड "सरदार" होता. दगडी अधिरचनांसारख्या स्मारकात्मक पैलूंना संपत्तीचे चिन्हक म्हणून महत्त्व दिले गेले असले तरी, या संरचनांची निर्मिती त्यांच्या बांधकामादरम्यान एकत्रित कामगार आणि सामायिक उपभोग क्रियाकलापांचे उत्पादन म्हणून उपयुक्तपणे समजली जाऊ शकते, ज्यामध्ये मेजवानी समाविष्ट असल्याचे दिसून येते ( बाउर आणि जोहानसेन, २०२३ ). अशा प्रकारे, बांधकाम प्रक्रियांनी समुदाय तयार करण्यास किंवा राखण्यास मदत केली असती आणि सामाजिक स्थिती स्पर्धेसाठी ठिकाणे प्रदान केली असती. एकदा तयार झाल्यानंतर, या वैशिष्ट्यांमुळे काही सामाजिक गटांशी संबंधित ठिकाणे आणि या जागांमध्ये त्यांचा विशेषाधिकार प्राप्त प्रवेश म्हणून चिन्हांकित केले गेले. मस्कीच्या जागेवरील अलीकडील संशोधनामुळे पूर्वीच्या नवपाषाण काळापासून (सुमारे २००० ईसापूर्व) दफन पद्धतीतील सातत्यतेचे पैलू स्पष्ट होऊ लागले आहेत, जे कदाचित दगडी बांधकाम साहित्य आणि मेगालिथिक स्मारक घटकांच्या नाविन्यपूर्ण वापराद्वारे विस्तृत केले गेले असावेत ( बाउर आणि जोहानसेन, २०२३ ).

अजून दाखवा
संदर्भ कार्य
पुरातत्वशास्त्राचा विश्वकोश (दुसरी आवृत्ती)
२०२४ , पुरातत्व विश्वकोश (दुसरी आवृत्ती)
डोरियन क्यू. फुलर , अण्णा एमएच डेन हॉलंडर
प्रकरण

आशिया, दक्षिण | मेगालिथ्स
लोहयुगातील मेगालिथिक रिंगणाची पुनरावृत्ती: मेगालिथिक मटेरियल कल्चरवरील अलीकडील संशोधने
मेगालिथिक भौतिक संस्कृतीवर विपुल साहित्य असूनही, पर्यावरणीय आणि पद्धतशीर चौकटीविरुद्ध डेटा एकत्रित करण्यासाठी आतापर्यंत कोणतेही व्यापक प्रयत्न केले गेले नाहीत. पूर्वीच्या संशोधकांचे प्राधान्यक्रम आणि दृष्टिकोन वेगळे असले तरी, त्यांनी त्यांचे बरेचसे प्रयत्न संस्कृती इतिहासाच्या पुनर्बांधणीसाठी समर्पित केले. मेगालिथिक उत्पादन पद्धती, उत्पादन संबंध , सामाजिक भेदभावाचे पैलू आणि सामाजिक संघटना यांच्याशी संबंधित जटिल प्रश्न मोठ्या प्रमाणात दुर्लक्षित राहिले.

तथापि, मेगालिथिक काळातील भौतिक डेटाचे अलिकडच्या परिमाणात्मक मूल्यांकन, तसेच पर्यावरणीय आणि पद्धतशीर चौकटीच्या तुलनेत त्याचे एकत्रीकरण, असे दर्शविते की उत्पादनाच्या सामाजिक स्तरावर विशेष धोरणे, म्हणजेच शेती आणि पशुपालन यांचे संयोजन स्वीकारले गेले. वर्धा-पेनगंगा मैदान, वैनगंगा खोरे, मध्य कृष्णा खोरे, रायलसीमा पठार, दक्षिण आंध्र घाट, धारवाड पठार, बंगळुरू प्रदेश, म्हैसूर प्रदेश, दक्षिण मलनाड, मेत्तूर-वेल्लोर प्रदेश, कोइम्बतूर उंच प्रदेश, पालार-पोन्नैयार खोरे, वैगई-तांबरापरानी खोरे आणि दक्षिण मलबार या भौगोलिक झोनमध्ये स्थित मेगालिथिक स्थळे निर्विवादपणे या निर्वाह धोरणांना सूचित करतात. येथे हे लक्षात घेणे महत्वाचे आहे की त्यांच्या वसाहतीची बहुतेक ठिकाणे प्रमुख नद्यांच्या काठावर किंवा त्यांच्या प्रमुख उपनद्यांवर आहेत आणि बहुतेक दफन स्थळे  प्रमुख जलसंपत्तीपासून 10-20 किमी अंतरावर आहेत. या निर्वाह धोरणाचे संकेत पुढील तथ्ये देखील देऊ शकतात: (१) नदीच्या खोऱ्या आणि खोऱ्यांमध्ये त्यांच्या जागांचे जास्तीत जास्त प्रमाण आणि काळी माती आणि लाल वाळू-चिकट मातीच्या झोनमध्ये व्यापण्यास दाखवलेले प्राधान्य; (२) पर्जन्यमान झोनमध्ये या जागांचे वितरण स्वरूप जेथे सरासरी वार्षिक पर्जन्यमान ६०० ते १५०० मिमी पर्यंत असते; तसेच (३) मुख्यतः उष्णकटिबंधीय कोरडे पानझडी, उष्णकटिबंधीय काटेरी आणि उष्णकटिबंधीय ओलसर पानझडी वन झोनमध्ये त्यांच्या जागांची जास्तीत जास्त संख्या इतर दाट वन झोनप्रमाणे टाळणे. 

तथापि, नैऋत्य आंध्र प्रदेश, वायव्य कर्नाटक आणि तेलंगणा, रायलसीमा पेनेप्लेन, दक्षिण आंध्र घाट आणि उत्तर मैदान या वायव्य आंध्र प्रदेशांमध्ये कुरुव (जे प्रामुख्याने मेंढ्या/शेळ्या पाळणारे आहेत) आणि गोल्ला (जे प्रामुख्याने गुरे पाळणारे आहेत परंतु कमी संख्येने मेंढ्या/शेळ्या पाळतात) यांच्या सध्याच्या वितरणात दिसून येणारे पशुपालन परंपरांचे प्राबल्य हे पशुपालन निर्वाह धोरणाकडे जास्त कल दर्शवू शकते. हे पर्यावरणीय ताण आणि या निर्वाह धोरणाद्वारे प्रदान केलेल्या मोठ्या आर्थिक फायद्यांमुळे असू शकते. जरी या प्रदेशांमध्ये पशुपालनाचे खूप मजबूत पुरावे असले तरी, सध्या मेंढ्या/शेळ्या पाळण्याबाबत पुरातत्वीय पुराव्यांमध्ये अभाव आहे. ही कमतरता प्रामुख्याने पुरावे शोधण्यासाठी प्रयत्नांच्या अभावामुळे असल्याचे दिसते. तथापि, हे एक कार्यरत गृहीतक म्हणून घेतले जाऊ शकते आणि भविष्यातील तपासांनी त्यांचा शोध घेतला पाहिजे. तरीही, हे उपरोक्त भिन्न आर्थिक नमुने, जे तेव्हा प्रचलित होते, जसे की आताही आहे, वेगळे नव्हते परंतु एकमेकांशी सहजीवन संबंध होते.

Their subsistence base was a specialized agropastoral economy dominated by cereal, millet, and pulse production: there seem minor variations in the agroeconomy of the area. There is evidence for the occurrence of wheat, rice, barley, kodo millet, and pulse crops in Vidarbha (Wardha–Penganga plain, Wainganga basin); barley, rice, kodo millet, and pulses in the Middle Krishna valley and Andhra Ghats south area; and, the remaining parts of South India have mostly produced the evidence of rice, ragi, kodo millet, and pulses. The cattle (including buffalo) predominates over other domesticated species and invariably, in all these sites it accounts for more than 60% of the total faunal assemblage; whereas sheep/goat accounts for only 10–15% and was next only to cattle in importance. This suggests that first the earlier Neolithic tradition of cattle keeping was continued and second it clearly brings home that cattle pastoralism and not sheep/goat pastoralism formed a major preoccupation of the Megalithic society. Thus, irrespective of the variations in agriculture, cattle herding seems to have formed a major preoccupation of the Megalithic society in all these areas.

There is enough evidence that many of the known 400 settlement sites of this period testify that industrial activities such as smithery, carpentry, bead making, and pottery manufacturing were carried out, displaying as they do a highly developed tradition in these crafts. The items of exchange seem to have consisted mainly of iron tools and weapons, copper and gold ornaments, semiprecious beads, and pottery. Although it is not possible at this juncture to give a clearer picture of exchange network of various items in this area, the following areas seem to be major zones of industrial activities.

Kumaun area for iron working; Wainganga basin (or Nagpur plain) and Wardha–Penganga plain for iron, copper, silver, and semiprecious bead working; Telangana peneplain, Rayalaseema peneplain, Gulbarga plain, Bijapur region, Dharwad plateau, and Raichur plain for iron, copper, and gold working; Bangalore region, Mettur–Vellore region, and Coimbatore uplands for iron, gold, and semiprecious bead working.

The location of several large Megalithic sites on the known early historical trade routes leaves a strong possibility of these acting as places/centers for exchange. Although the gravity of exchange mechanism and patterns of consumption still need to be understood, the hierarchical nature of sites and occurence of nonlocal prestige goods such as gold, marine shell, lapis lazuli in Megalithic burials leave little doubt about the inter-regional circulation of these goods. Besides indicating long-distance trade, it also shows growing acquaintance with new areas of the resource-rich zones of South Asia.

The above synthesis of the material conditions of Megalithic society may help us to comprehend its ideological manifestations also. Although no comprehensive attempt has so far been made to understand the Megalithic religion and ritualism, the basic objective here is to know the role of religion and ritualism as part of ideological system of the Megalithic society. The main source of information invariably are the burials as they form a prominent feature and are crucial in understanding some of the ideological facets of the Megalithic society. A casual survey of the cemetery sites shows that megaliths typically cluster in groups, showing continued use of the same burial area for several centuries. However, it is becoming increasingly clear that the megalithic burial monuments were meant to hold only a very restricted number of persons, and the burial took place in them rather rarely, once or twice in a generation. It is also likely that these burials reflect only a certain (upper?) segment of the society.

It may be contextually useful to recapitulate here the nature of burial practices of the preceding periods, that is of the Neolithic and the Chalcolithic phases. Excavations at many Neolithic, and Chalcolithic sites of South Asia have clearly shown the practice of pit, and urn (kept horizontally, mouth-to-mouth) burial methods for disposing of the dead in primary condition. The dead were buried invariably within the settlement and mostly inside the living premises.

In contrast to this practice, during the Megalithic period in general, the dead were buried outside and away from the settlement area. Both primary and secondary burials occur in this period. The three main sepulchral categories which were in vogue during this period, namely the pit burials, chamber burials, and legged/unlegged urn burials have already been emphasized earlier. Certain structural features such as passage, capstone, porthole, and even menhir (a nonsepulchral monument type) served as interchangeables within the aforementioned tomb types and evolved numerous subvarieties in the course of time.

However, what deserves attention here is the continuation of earlier Neolithic/Chalcolithic burial traditions (but now with a stone appendage over the burial). Leaving aside the sharp differences noticed in the actual treatment of the dead, and also the placement of the remains of the dead in an urn placed verticaly, these two burial methods, namely pit burials and urn burials, strongly indicate continuality of an earlier tradition. That this change was gradual and was definitely an indigenous development can be discerned from some of the earliest Megalithic sites such as Ramapuram, Gandlur, and Piklihal. However, same cannot be said about the chamber burial type. In the event of this being a borrowed mortuary practice, it is not clear whether the advent of this new mortuary element signifies the arrival of new people or was it just a borrowed ritual custom. This important aspect needs further investigation. It is also not clear whether the aforementioned sepulchral types, namely the pit burial, chamber burial, and legged/unlegged urn burial methods, indicate different ritualistic concepts connected with the burying of the dead or different ethnic groups.

A brief note regarding the occurence of anthropomorphic figures found in association with Megalithic burials may not be out of context here. The occurrence of these anthropomorphic figures in Megalithic sites right from Central Godavari valley to Tamil Nadu Hills is interesting. So far, from at least 15 Megalithic sites these have been reported. The shape and symbolic sculptural features greatly vary in these anthropomorphic figures. However, one striking feature is that they are invariably associated with chamber tombs and dolmens at most of these sites. Although their significance in the cult of the dead is yet to be comprehended, their close association with burial monuments indicates a connection with ancestor worship.

More importantly, a significant shift in the societal attitude toward certain age categories is discernible during the Megalithic period. In the preceding Neolithic/Chalcolithic period, a large number of infant/child burials and comparatively less adult burials are reported. But, as against this fact, in the Megalithic period very few child burials have been noticed and a majority of the burials are of the young-to-mature adults. Infant burials have not at all been found. Even within the adult category, the percentage of adult males is very high which in all probability strongly indicates the patriarchical nature of Megalithic society as also the dominant status of its male members.

It has been suggested that ritual activities form an active part of the social construction of reality within social formations and may be conceived as a particular form of the ideological legitimation of the social order, serving sectional interests of particular groups. That the construction of these monumental structures, both sepulchral and nonsepulchral, ultimately depended on the social mobilization of resources and societal cooperation is clearly implied.

Detailed ethnographic studies available for some of the ethnic communities such as Savaras, Gadabas, and Bondos, and Kodis practicing megalithism clearly show that these are closely connected with production–feast–alliance cycle. The occurrence of nonlocal prestige goods in limited number of megalithic burials of superordinate social dimension may suggest the control of long-distance trade by local elite groups, the procurement of which eventually depended on alliance and gift exchange. Thus, burials of superordinate category provide a clue as to how surplus production entered the local cycle of prestige building, embedded as it was in alliances and exchange.

It is also widely noticed that the ritualized chiefly organization of land and lineage through ancestor worship in megalithic tombs is a recurrent phenomenon in different parts of the world and occurs both in small-scale and more developed societies. There is a lack of conceptual studies of this genre for the study area, but these analogs do offer insights into the functional and organizational framework of the Megalithic monuments. If we can understand their functional role, it is quite clear that they do not represent burials as we understand them but may have served as ‘living entities’. The dead were not separated from the living, but lived as ancestors in their houses among the living and could be approached when opening the chamber or contacted through rites and offerings. In this way the megaliths symbolized the collective efforts of the community as also the heroic leadership of ancestor chiefs, legitimizing and sustaining the power of their successors. Thus, ritual and religion clearly served material functions in the social organization of production and the tombs formed part and parcel of the reproduction of power relations.

Significantly, the use of iron in these communities seems to have been limited in its initial phase. It is rightly observed that, in the beginning, the use of iron was mostly confined to the production of weaponry and did not contribute much to handicrafts and agriculture and that the weapons were probably in the sole possession of elites. Iron seems to have started playing a significant and effective role in these areas only after c. 500 BC as there is clear evidence in the increase of agricultural and craftsman's tools during this phase.

या क्षेत्रांमध्ये व्यावसायिक विभागांचा उदय आणि वाढ सामाजिक भेदभावाच्या सुरुवातीस कारणीभूत ठरल्याचे दिसते. मेगालिथिक समाजातील सामाजिक भेदभाव आणि रँकिंगचा पैलू त्यांच्या दफन स्मारकांच्या विश्लेषणातून स्पष्टपणे समोर येतो. तथापि, अधिक महत्त्वाचे म्हणजे, मेगालिथिक समाज एक प्रमुख-स्तरीय संघटना दर्शवितो आणि नियमित कर प्रणाली किंवा नियमित स्थायी सैन्याचे कोणतेही संकेत नाहीत, जे त्यानंतरच्या राज्य समाजांची वैशिष्ट्ये आहेत.

शेती आणि कारागिरांच्या अवजारांच्या वाढीवरून दिसून येते की, सघन शेतीमध्ये वाढ आणि खनिज संसाधनांचा अधिक वापर - हे मेगालिथिक समाजाच्या नंतरच्या टप्प्याचे (इ.स.पू. ५०० नंतर) वैशिष्ट्यपूर्ण असल्याचे दिसून येते . कदाचित  , तंत्रज्ञानातील सुधारणांमुळे, म्हणजेच उत्पादन तंत्रांमध्ये प्रगती झाल्यामुळे भातशेतीला नवीन आयाम प्राप्त झाले आणि यामुळे लोकसंख्याशास्त्रीय विस्तार झाला असे दिसते. स्थळांच्या संख्येत वाढ आणि नवीन क्षेत्रांचे वसाहतीकरण हे निश्चितच ऐतिहासिक विकासाच्या पुढील टप्प्यांवर परिणाम करणारे परिणाम होते.

अजून दाखवा
संदर्भ कार्य
पुरातत्वशास्त्राचा विश्वकोश
२००८ , पुरातत्वशास्त्राचा विश्वकोश
यूएस मुर्ती
प्रकरण

आफ्रिका, मध्य | सुदान, निलोटिक
शब्दकोष
कुशलतेने बनवलेल्या द्विमुखी चकमक हाताच्या कुऱ्हाडींनी वैशिष्ट्यीकृत असलेल्या खालच्या पुरापाषाण संस्कृतीचे नाव देणे किंवा त्याचे वर्णन करणे.

कृत्रिम वस्तू
मानवांनी बनवलेली, वापरलेली किंवा सुधारित केलेली कोणतीही वस्तू. सामान्य उदाहरणांमध्ये साधने, भांडी, कला, अन्नाचे अवशेष आणि मानवी क्रियाकलापांचे इतर उत्पादने समाविष्ट आहेत.

अटेरियन
उत्तर आफ्रिकेतील पुरापाषाणयुगातील विकसित शैली मानली जाणारी दगडी बांधकाम परंपरा ; त्यात हँडलवर बसवण्यासाठी शँक्स (म्हणजेच, टँग) असलेली विशिष्ट साधने आणि मुळात काम केलेल्या पानांच्या आकाराचे बिंदू समाविष्ट आहेत.

चुनखडीयुक्त
कॅल्शियम कार्बोनेट खनिजे असलेले .

प्राचीन महासागरातील गाळात तयार झालेला हा अतिशय बारीक दाणेदार खडक आहे . याला बहुतेकदा अर्ध-काचेचा रंग असतो आणि तो सहसा पांढरा, गुलाबी, तपकिरी, राखाडी किंवा निळा-राखाडी रंगाचा असतो. तो चिरडून बाणांच्या टोकांमध्ये आकार देऊ शकतो. त्याला अनेकदा चकमक म्हटले जाते, परंतु खरा चकमक खडूच्या साठ्यात आढळतो आणि त्याचा रंग काळा असतो.

पांगापांग
ज्या प्रक्रियेत जीव भौगोलिकदृष्ट्या पसरतो.

चकमक दगड
क्वार्ट्जचा एक कठीण, ठिसूळ सूक्ष्मस्फटिकीय प्रकार जो सामान्यतः गाळाच्या चुनखडीत किंवा खडूच्या साठ्यात किंवा अन्यथा कोणत्याही प्रकारच्या दगडात आढळतो ज्याला सोलता येते.

लिथिक
दगडी हत्यारे किंवा प्रक्षेपणास्त्रे.

लिथिक स्कॅटर
विशिष्ट पुरातत्वीय संदर्भातून न जाता पृष्ठभागावरून मिळवलेल्या लिथिक कलाकृतींचा अवकाशीयदृष्ट्या वेगळा, जरी कधीकधी विस्तृत, विखुरलेला, उदाहरणार्थ, फील्डवॉकिंगद्वारे.

मेगालिथ
अत्यंत मोठ्या दगडांची मांडणी किंवा रचना, कदाचित संरेखित केलेली.

सूक्ष्म दगड
लहान अवजारे जी विविध आकारांची असू शकतात आणि जी मायक्रोब्लेडपासून बनवली जातात. ही अवजारे हाफ्टिंगशिवाय वापरता येणार नाहीत इतकी लहान आहेत, काही हाड किंवा लाकडी शाफ्टमध्ये खोबणीत कडेला कडेला बसवलेली होती आणि त्यामुळे ती कटिंग अवजारे म्हणून वापरली जात असती, तर काही बार्ब म्हणून काम करत असती.

नवपाषाणयुगीन
कोणत्याही प्रदेशातील ग्रामीण शेतकऱ्यांच्या पहिल्या युगाचा संदर्भ देते.

भटक्या
अन्न, पाणी आणि चराईच्या शोधात ऋतूनुसार एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी स्थलांतर करणाऱ्या लोकांच्या गटाचा सदस्य.

ऑप्टिकली उत्तेजित ल्युमिनेसेन्स (OSL)
क्वाटरनरी जिओलॉजिकल एज-डेटिंग तंत्राचा वापर गाळाचे निक्षेपण वय निश्चित करण्यासाठी केला जातो, ज्यामध्ये खनिज धान्यांना डोसीमीटर म्हणून विचारात घेतले जाते जे नैसर्गिक पर्यावरणीय किरणोत्सर्गाचे कार्य म्हणून कालांतराने ऊर्जा 'संचयित' करतात. हे तंत्र घटक घटकांच्या समस्थानिक क्षय (जसे की K–Ar किंवा रेडिओकार्बन डेटिंग) ऐवजी खनिज धान्यांच्या घन-अवस्थेच्या गुणधर्मांवर आधारित आहे.

शेतीचा हा प्रकार विशेषतः पशुपालन म्हणून ओळखला जातो; त्यात उंट, शेळ्या, गुरेढोरे, याक, लामा आणि मेंढ्या यांसारख्या प्राण्यांचे पालनपोषण आणि वापर समाविष्ट आहे. त्यात एक गतिमान घटक देखील आहे, जो ताज्या कुरणांच्या आणि जलसंपत्तीच्या शोधात कळपांना हलवतो.

प्लाइस्टोसीन
एक भूगर्भीय कालखंड, ज्याला सामान्यतः सर्वात अलीकडील हिमयुग मानले जाते, जो सुमारे १.८  दशलक्ष वर्षांपूर्वी सुरू झाला आणि सुमारे ११,५०० वर्षांपूर्वी  मोठ्या खंडीय हिमनद्यांच्या वितळण्याने संपला ज्यामुळे आधुनिक हवामान पॅटर्न तयार झाला .  

प्लुविअल
हा शब्द सामान्यतः वाढत्या पर्जन्यमान आणि कमी बाष्पीभवनाने वैशिष्ट्यीकृत कालावधीसाठी वापरला जातो, ज्यामुळे आर्द्रतेची स्थिती वाढते.

प्रागैतिहासिक
दिलेल्या क्षेत्रासाठी लेखी नोंदींपूर्वीचा काळ; लक्षात घ्या की प्रागैतिहासिक काळाची परिपूर्ण तारीख ठिकाणानुसार बदलते.

सामाजिक गुंतागुंत
व्यक्तीपासून ते गटापर्यंतच्या पातळीवर समाजातील नमुन्यांचा संदर्भ देते, कारण ते समाजाला समाविष्ट करणाऱ्या आणि आजूबाजूच्या विविध मानवी अनुकूली प्रणालींशी संबंधित आहे. जटिलता समुदाय, प्रादेशिक प्रणाली किंवा साम्राज्यांच्या विधी, संस्कृती आणि पद्धतींचा संदर्भ घेऊ शकते.

स्तरीकृत
हा शब्द प्राथमिक (अविभाज्य) वैशिष्ट्यांसह गाळाचा संदर्भ देतो, जो सलग थरांमध्ये जमा झाला आहे किंवा ठेवला गेला आहे. बऱ्याचदा थरांचा क्रम एक सापेक्ष कालक्रमानुसार क्रम प्रदान करू शकतो, ज्यामध्ये सर्वात जुना तळाशी आणि सर्वात नवीन वरच्या बाजूला असतो.

अजून दाखवा
संदर्भ कार्य
पुरातत्वशास्त्राचा विश्वकोश
२००८ , पुरातत्वशास्त्राचा विश्वकोश
कॅथलीन निकोल
प्रकरण

पाया, पद्धती आणि समकालीन वादविवाद
उत्तर जर्मनी आणि दक्षिण स्कॅन्डिनेव्हियामधील मेगालिथिक लँडस्केप्सचे उदाहरण
युरोपमधील सर्वात जुन्या सांस्कृतिक भूदृश्यांमध्ये युरोपियन मेगालिथिक भूदृश्ये आहेत. मूळतः, उत्तर मध्य युरोप आणि दक्षिण स्कॅन्डिनेव्हियामध्ये सुमारे 150,000 स्मारके उभारण्यात आली होती. त्यांचा इतिहास भूदृश्य पुरातत्वशास्त्राच्या विविध पैलूंचे वर्णन करण्यासाठी एक चांगले उदाहरण देतो ( मुलर, 2019 ; निटर आणि इतर, 2019 ; क्नेसेल आणि इतर, 2019 ; फीसर आणि इतर, 2019 ; ब्रोझियो आणि इतर, 2019 ; किर्लीस आणि इतर, 2012 ) ( आकृती 9-10 ).


पूर्ण आकाराची प्रतिमा डाउनलोड करण्यासाठी साइन इन करा.
आकृती ९ . पहिले सांस्कृतिक भूदृश्य उत्तर मध्य जर्मनीमध्ये सुमारे ३५०० ईसापूर्व तयार झाले. पुनर्बांधणीमध्ये ३४०० ईसापूर्व एका स्मारकाच्या आत एका मेगालिथिक थडग्याची उभारणी दर्शविली आहे, ज्याची सुरुवात एका लांब ढिगाऱ्यापासून झाली (उत्तर जर्मनीतील कील जवळील फ्लिंटबेक). चाक आणि वॅगन आणि प्राण्यांच्या मागोवा घेतलेल्या नांगराच्या परिचयामुळे प्रचंड जमीन मोकळी झाली आणि लोकसंख्येत मोठी वाढ झाली. या पुनर्बांधणीचा प्रत्येक तपशील पुरातत्व-पर्यावरणीय आणि पुरातत्वीय डेटावर आधारित आहे.


पूर्ण आकाराची प्रतिमा डाउनलोड करण्यासाठी साइन इन करा.
आकृती १०. दक्षिण सिम्ब्रियन द्वीपकल्प आणि उत्तर जर्मनीमध्ये सुमारे ४१००-१७५० ईसापूर्व (z-स्कोअर प्रति ५० वर्षांच्या स्मारके, कलाकृती आणि पॅलेनोलॉजिकल प्रॉक्सींच्या परिपूर्ण संख्येवर आधारित आहेत) स्मारक बांधकाम, कलाकृतींचे साठेबाजी आणि जमिनीच्या वापरातील तीव्रतेचा आलेख. सामान्य सिरेमिक आकार प्रदर्शित केले आहेत.

In the mentioned area, sedimentological and climatic analysis identified “40 bad years” spanning from 4050–4010 BCE in laminated lake sediment sequences of the western Baltic lakes. A shortened vegetation period during the summer months and long winters are characteristic of this weather oscillation. The change in fish and mollusc composition influenced the local foraging economies in a way where Neolithic technologies were integrated into the local foraging subsistence practices. This happened partly by acculturation, partly by the entry of farming and herding individuals, and was possible since the communities obviously opened their networks. As a consequence, patches of cultivated areas and animal feeding in open areas at water sites were established. The new economy laid the foundation for population growth that furthered other activities (e.g. the demarcation of the landscape by non-megalithic long mounds). These practices might have represented a continuation of a former demarcation of northwest areas by white shining shell middens, partly of similar size, which already indicated the special meanings of certain landscape areas by forging communities. For the first time, clusters of up to 220 m long non-megalithic mounds were imposing visible meaning onto parts of the landscape—the deceased were integrated into communal activities, which are visible in the manifold mound biographies, and integrated as ancestors into the world of the living. Monumental landscapes became the precursor for a development that led to significant landscape changes, especially due to new agricultural techniques.

The main shift in landscape practices was due to the introduction of the animal tracked plow, deep sea maritime facilities and the wheel and waggon around 3600 BCE. The transfer from extensive to intensive agriculture is not only visible in tremendous clearances and an increase in land use, but also in a changing meaning of environmental practices. While cereals and cultivates dominate within domestic sites, gathered wild plants are predominant within the megalithic collective burials. In contrast, in central ritual and communication knots of causewayed enclosures, plants of the direct vicinity dominate (Fig. 11). This indicates a pattern of areas for economic subsistence demands, such as spaces for burials, and others for communication purposes. The latter categories of sites are of visible character, whereby demarcations in the landscape are often marked by huge twin posts at certain entrances. The perception of the partly self-made environs is consciously or unconsciously reflected in different landscape practices.


Sign in to download full-size image
Fig. 11. Ritual communication nodes structure the meaning of landscapes. In the Neolithic causewayed enclosure Büdelsdorf (Northern Germany), the demarcation of one of the causeways was marked with a huge wooden post. A fireplace is also discernible, at which cereals were burnt. The assemblage both enhanced the visibility of the site and encompassed the ritual situation together with special mostly rectangular fire pits that were in line with the palisade and the ditch system. Infillings and recuttings within the elongated pits were carried out according to a generational time scale.

Of considerable importance in the newly created cultural landscape is the reconstruction of the integrative behavior and the integrative meaning content of the environment and living beings, including humans. The already mentioned distribution differences of plants in different site categories are complemented by differences in animal food. Thus, lipid analyses show that offerings of cattle meat, similar to valuable oils, are especially found as grave goods in vessels of megalithic tombs, whereas vegetables dominate the food in settlements. Accordingly, we can establish a symbolic meaning association of cattle in connection with the rite of passage to death, of collected plants as a possible connection to the wild and of domesticated plants primarily in the settlement areas. Since the distribution of settlements is related to individual areas of the lowlands—megaliths to the elevated hinterlands, and causewayed enclosures to important communication nodes at waypoints—such meanings can be applied to individual landscapes. However, regional and local differences are also significant. In the Altmark, for example, the construction and maintenance of megalithic graves can be observed in forests far away from settlements, which were neither used for herring activities nor for other economic activities. The burials take place here as in a kind of “peace forest”, i.e. landscapes that have been disengaged from economic use. In contrast, in numerous other areas it is quite clear that megaliths are directly located on the farmland and seem to serve as markers of ownership here, using the ancestors.

शिवाय, स्थळे आणि भूदृश्यांचा चक्रीय वापर दिसून येतो. पुरातत्वीय वारसा धार्मिक कृतींच्या संदर्भात (उदा. विधी पद्धतींद्वारे, जसे की खड्डे पुन्हा कापणे आणि भरणे किंवा मेगालिथिक कबरींमध्ये वास्तुशिल्पीय बदल) त्यांच्या स्वतःच्या नियमांची खात्री करण्यासाठी दर तीन किंवा चार पिढ्यांना वेगवेगळ्या स्थळांना भेटी दिल्याचे दृश्यमान करतो ( आकृती १२ ). अशा पद्धतींद्वारे, अशिक्षित समाजांमध्ये संस्थात्मक ज्ञान पिढ्यानपिढ्या वेगवेगळ्या मार्गांनी हस्तांतरित केले जाते. स्मृती परिवर्तनासाठी सर्वात महत्वाचे माध्यम म्हणजे या समाजांच्या केंद्रस्थानी भौतिकीकरण. युरोपियन नवपाषाण स्थळांचे हे चरित्र अशा पूर्वजांच्या आणि सामाजिक आठवणींच्या निर्मितीसाठी विविध लय देतात ज्या संज्ञानात्मक भूदृश्यांमध्ये अंतर्भूत आहेत. संलग्नक आणि मेगालिथमधील उल्लेखित उदाहरणे हे भौतिकीकरण आणि अशा परिवर्तन प्रक्रियेत ही स्मारके कोणती सक्रिय भूमिका बजावतात हे दर्शवितात. हे वेगवेगळ्या वेळी वेगवेगळ्या ठिकाणी स्वतंत्रपणे घडू शकते ( म्युलर, २०१८बी ; स्टीवर्ट आणि स्ट्रॅथर्न, २००३ ; स्कामा, १९९५ ).


पूर्ण आकाराची प्रतिमा डाउनलोड करण्यासाठी साइन इन करा.
आकृती १२. दक्षिणेकडील सिम्ब्रियन द्वीपकल्पातील निओलिथिक प्रमुख स्थळांमध्ये आणि अशिक्षित समाजांमध्ये स्मृती निर्मितीच्या कालरेषा. बाण नवीन आठवणी आणि स्मरणशक्तीच्या कालखंडांना चिन्हांकित करतात.

उत्तर युरोपमधील मेगालिथिक थडग्यांची भरभराट ही मोकळ्या जागेच्या वाढीशी आणि जमिनीच्या वापराच्या तीव्रतेशी जोडलेली आहे ( आकृती १० ). अशाप्रकारे विकसित सांस्कृतिक लँडस्केपची प्रेरणा आणि अर्थ दैनंदिन निर्वाह क्रियाकलापांद्वारे स्पष्ट केला जाऊ शकतो, ज्यामध्ये लोक स्वतःला, जिवंत आणि मृत वस्तूंना एका धार्मिक विधीमध्ये तसेच वस्तूंच्या आर्थिक चक्रात उतरवतात. ३१०० ईसापूर्वच्या सुमारास मेगालिथिक थडग्यांच्या बांधकामात अधिक शोधता येणारा मोडतोड कृषी क्रियाकलापांमध्ये घट होण्याशी संबंधित आहे. त्यानुसार, आपण येथे उत्तर युरोपच्या पहिल्या सांस्कृतिक लँडस्केपचे महत्त्व दैनंदिन सहकार्याशी जोडू शकतो, तर सुमारे दोनशे वर्षांनंतर, स्मारकाची एक नवीन लाट इतर नक्षत्रांशी जोडली गेली आहे. २७०० ईसापूर्वच्या सुमारास, ते आता कृषी क्रियाकलाप राहिलेले नाहीत, तर सुप्रा-प्रादेशिक नेटवर्कमध्ये सहभागाद्वारे स्थिती प्राप्त झाली आहे, जी लँडस्केपचे नवीन परिवर्तन घडवते.

अजून दाखवा
संदर्भ कार्य
पुरातत्वशास्त्राचा विश्वकोश (दुसरी आवृत्ती)
२०२४ , पुरातत्व विश्वकोश (दुसरी आवृत्ती)
जोहान्स मुलर
प्रकरण

फील्डवर्क
महत्त्वाचे मुद्दे
अपवित्र साइट्स
वसाहतीशी संबंधित ठिकाणे
या श्रेणीमध्ये सर्व प्रकारच्या पुरातत्वीय स्थळांना एकत्र केले आहे , ज्यामध्ये लोकांच्या वस्तीचे पुरावे आहेत, म्हणजेच ते जिथे राहत होते, अन्न शिजवत होते आणि वापरत होते ते क्षेत्र: गुहा, गुहा, छावण्या, शहरे, गावे, वस्त्या, निवासी क्षेत्रे, किल्ले इ. ही श्रेणी सर्वात विस्तृत आणि वर्गीकृत करणे कठीण आहे, ज्यामध्ये डझनभर संभाव्य स्थळ प्रकार आहेत. काही स्थळांच्या वैशिष्ट्यांना मूलभूत महत्त्व आहे, म्हणून सर्व स्थळांना अनुक्रमे त्यांच्या कायमस्वरूपी किंवा अधूनमधून वस्तीसाठी वापरण्याच्या आधारावर दोन करांमध्ये विभागले जाऊ शकते. नियतकालिक मानवी उपस्थिती असलेल्या पुरातत्वीय स्थळांमध्ये व्यापार मार्गांवरील छावण्या, भटक्या छावण्या आणि हंगामी वसाहतींचा समावेश आहे. तटबंदीची उपस्थिती किंवा अनुपस्थिती हे आणखी एक वैशिष्ट्यपूर्ण वैशिष्ट्य आहे, ज्यामुळे खालील स्थळ प्रकार वेगळे करणे शक्य होते: वस्ती, किल्ला, किल्ला, बुरुज इ. स्थळाच्या बांधकामाचे तंत्रज्ञान देखील महत्त्वाचे आहे, तसेच स्थानिक परंपरा देखील. तंत्रज्ञान आणि परंपरा दोन्ही साइट प्रकारावर कसा परिणाम करतात याचे एक चांगले उदाहरण म्हणजे "टेल्स", एक अतिशय खास प्रकारची निवासी साइट, जी युरेशियाच्या काही प्रदेशांमध्ये वैशिष्ट्यपूर्ण आहे ( पम्पेली, १९०८ ; सरियानिडी, १९६२ ; व्हेर्होवेन, १९९९ ). अॅडोब-ब्रिक आर्किटेक्चरवर आधारित, हळूहळू परंतु सतत पुनर्बांधणीची आवश्यकता सांगते, ज्यामुळे अद्वितीय कृत्रिम टेकड्या तयार झाल्या, ज्या क्रमाने स्तरीकृत ठेवींच्या अनेक थरांनी बांधल्या गेल्या.

निवासी जागांचे प्रकार आणि उपप्रकार इतके विविध आहेत की त्यांचे संपूर्ण वर्णन या नोंदीमध्ये सादर केले जाऊ शकत नाही. पुढील परिच्छेदांमध्ये, या श्रेणीतील सर्वात सामान्य प्रकारांची थोडक्यात रूपरेषा दिली आहे.

गुहा, गुहा, दगडी आश्रयस्थाने
या प्रकारची जागा त्याच्या विशिष्ट अवकाशीय व्यवस्थेद्वारे परिभाषित केली जाते आणि पारंपारिकपणे मानवी इतिहासातील सर्वात प्राचीन काळ, पाषाण युगाशी संबंधित आहे ( कॉर्नफेल्ड आणि इतर, २००७ ). नैसर्गिक शक्ती आणि वन्य प्राण्यांपासून लोकांना संरक्षण देणारे व्यावहारिकदृष्ट्या तयार निवासस्थानाचे अस्तित्व हे वास्तव्य करण्यासाठी जागा निवडण्यासाठी एक महत्त्वाचा निकष होता. कालांतराने, मानवजातीने पर्यावरणीय धोक्यांवर मात करण्यासाठी इतर मार्ग विकसित केल्यामुळे, या प्रकारच्या जागेचे महत्त्व हळूहळू कमी झाले. तथापि, अशा ठिकाणी नंतरच्या मानवी उपस्थितीचे अंश नियमितपणे दिसून येतात, जे तात्पुरते निवारा म्हणून त्यांचा पुनर्वापर होण्याची शक्यता दर्शवितात .

कॅम्पसाईट्स
या प्रकारच्या स्थळांमध्ये फरक करण्याचे मुख्य निकष म्हणजे तुलनेने पातळ सांस्कृतिक थर आणि कायमस्वरूपी निवासस्थानांचे अवशेष नसणे. याव्यतिरिक्त, साठवणुकीचे खड्डे आणि/किंवा चूल आढळू शकतात, ज्यापैकी काही दगडी संरचनांनी रेखाटलेले आहेत, तसेच जळलेल्या मातीचे ठिपके आहेत, जे वारंवार गोळीबार किंवा एकाच ठिकाणी दीर्घकाळ आगीची देखभाल दर्शवितात ( बेलानोव्स्काया, १९९५ ).

Campsites are among the most difficult site types to detect and document, due to the lack of surface signs. The most common methods for their detection are archaeological survey and coring, while remote sensing methods (magnetometry, georadar, etc.) are not very effective with this site type. Studying these sites is additionally complicated by the lack of stratigraphy, i.e. of archaeological remains deposited over a very long period of time, usually forming a solid cultural layer.

There are two main subtypes of campsites, differentiated by the principle of their formation. The first is campsites serving as a temporary shelter located on regular transport or trade routes. The second subtype is associated with certain types of agricultural management, as is suggested by the absence of stationary dwellings. An example can be found among the sites of nomads of the Eurasian steppes or reindeer herders of the north, which are characterized by the use of light and portable dwelling structures. With the gradual exhaustion of the forage base, the population of the sites would move to new territories, which made the construction of permanent dwellings irrational. Such relocation was periodic, and usually took place along an established route.

Settlements
Unlike campsites, settlements are distinguished by the presence of permanent dwelling remains and relatively thicker cultural layers, which indicates long-term human habitation in the area (Passek, 1949; Hayden, 1996). The most common signs of permanent dwellings are pit houses or semi-dugout sunken-floor buildings, post holes, and foundation structures (Savinov, 1996). However, there are also other, less common variants, for example, traces of Neolithic pile settlements on the bottom of lakes or in riverbeds. The methods of their identification are generally the same as for campsites. The main role is played by the archaeological survey. It is also quite common to observe traces of dwellings on the modern surface in the form of depressions, rows of post holes or surviving stone structures. In contrast to campsite detection, remote sensing techniques are very efficient in identifying and studying ancient settlements. Remote sensing allows general mapping of settlements as well as helps to differentiate individual buildings and structures without excavation.

Unlike campsites, settlements provide an archaeologist with an opportunity to excavate larger areas, allowing to distinguish functional areas of the site: living quarters, outbuildings, workshops, etc., which allows a reasonable interpretation of the economic model of the population. The stratigraphy of the settlements requires special attention. Usually, such sites have a rather long lifespan, resulting in formation of stratigraphic layers reflecting various chronological periods.

Ancient Towns
The next type implies the presence of fortification in the form of ditches, ramparts, palisades, etc. Traditionally, these are wooden-earth and stone structures. They come in significantly varying sizes, ranging from a few hundred square meters to many square kilometers. Ancient towns' layout varies from irregular to regularly planned urban spaces.

Sites of this type are usually clearly visible on the ground and can be easily identified by archaeological survey. However, an even more efficient way to identify ancient towns is the analysis of aerial photography (Fig. 2). A striking example of the successful use of this technique is the identification of a large group of fortified settlements of the Sintashta archaeological culture in the southern Trans-Urals (Zdanovich and Batanina, 2007). While studying ancient towns, it is necessary to put additional research effort into the design of the defensive structures; the very existence of such remains implies the presence of armed threat, which can be of either external or internal origin.


Sign in to download full-size image
Fig. 2. Aerial view of the Arkaim settlement, taken in 1987 before the archaeological excavations (Zdanovich and Batanina, 2007)

Complex Towns and Fortresses (Shakhristans, Rabads, Citadels)
Finally, the town or shakhristan is the most developed and chronologically latest version of residential sites. It has a number of distinctive features, in terms of both social structure and archaeological remains (Andreev, 2010). The boundary between towns and ancient town settlements cannot be formulated as a set of clear-cut criteria, but is rather a combination of various features. In regions where stone was scarce, towns were built differently. For example, in the north of Ancient Rus', wood served as the main construction material due to its accessibility, as can be seen in Veliky Novgorod (Zasurtsev, 1967; Thompson, 1967; Kolchin and Yanin, 1982). In the meantime, in the steppes and deserts of Asia adobe architecture thrived, starting from the Neolithic era and covering later urban periods as well (Pumpelly, 1908; Sarianidi, 1962; Verhoeven, 1999). In the Mediterranean region, where forest was scarce, structures were mainly built of stone (Fig. 3).


Sign in to download full-size image
Fig. 3. Aerial view of the Acropolis of Mycenae (Demakopoulou, 1999)

A separate subtype of towns are fortresses or citadels featuring elaborate defensive structures. Their study is a special field of archaeology, closely related to the study of defensive and offensive weaponry, as well as tactics and strategy of ancient warfare. An extremely interesting element of archaeological study of fortresses are the traces of assaults, which researchers sometimes even manage to associate with specific historic events.

Productive and Industrial Sites
This is the second most important category associated with daily human activities. To sustain life, representatives of human groups had to leave their habitat to obtain the necessary resources: food, minerals, construction materials, etc. In many cases, to facilitate logistics, processing of raw materials was required: butchery, metal extraction, quarrying of stone. With the development of society, other needs appeared which led to the creation of infrastructure facilities: roads, canals, aqueducts, etc. As a result, special traces of human activity associated with production and processing sites can be identified.

It should be noted that humans have always aimed to bring industry as close as possible to the places of their permanent dwelling. Therefore, the emergence of industrial sites right on the territory of residential facilities is an absolutely inevitable phenomenon. In this category, we consider only those cases where these structures for some reason were located outside the residential areas, and constitute completely independent sites.

Animal or Fish Traps
Structures related to hunting or fishing are a specific type of archaeological sites. Usually they are hunting pits, which were dug out and disguised either beside animal trails or in places where animals could be driven to (Poshekhonova, 2006; Rudkovskaya, 2016). Unfortunately, the amount of information such sites can provide is limited. The correct dating is challenging as well. However, the study of these sites began recently and it has certain scientific prospects. An example of the use of such fishing traps are mazes made of poles or stone structures driven into or put onto the bottom of a water body or riverbed. They could be located either in the course of rivers (for example, Australian Aboriginal fish traps on the Barwon River in Brevarrina, Brevarrina County, New South Wales, Australia), or in tidal zones (traps of the archipelago of Penghu in western Taiwan).

Places for Cutting and Dressing Raw Food
When hunting, fishing, and gathering were the main sources of food supply, this specific site type was abundant. Hunting grounds were naturally located at some distance from places of human habitation. Transporting whole animal carcasses to the dwelling was time-consuming and impractical. As a result, a temporary camp would be set up at a hunting area—a place for the initial cutting and dressing of animal carcasses, from which only the necessary parts were extracted. Most often, over the course of time, these camps were located in the same convenient places. They are distinguished by a large number of bones and horns with cut marks.

Shell heaps or middens are a subtype of this category (Meehan, 1982; Andersen, 1991). Shellfish production cannot be carried out constantly in the same areas, therefore catchers are normally forced to move further and further away from their places of dwelling. As a result, the transportation of the caught shellfish to the settlements becomes more and more difficult. This leads to a logical solution in form of the primary processing—the separation of the shells, which account for a significant part of the weight of the catch. Over time, transition to agriculture and husbandry significantly reduced the role of such sites. Moreover, progressive forms of transportation (pack animals, vehicles) emerged which allowed processing at the permanent dwelling.

Structures Related to Agriculture (Dams, Canals, Terraces) and Cattle Breeding
Agriculture is one of the most important types of human economic activity. At the initial stages of its development, mostly the areas naturally suited for agriculture were exploited. However, with demographic growth and development of trade connections came the need to expend the areas of agricultural use. In arid climates, irrigation is the most important element of successful farming and the most effective way to increase soil fertility and crop yield. This required irrigation facilities (dikes, canals), constituting a separate type of archaeological sites (Andrianov, 1969; Lisitsyna, 1978; Ortloff, 2020).

Some regions provided additional options for expanding crops. In mountainous areas, the solution would come through artificial leveling of land by creation of terraces (Brown et al., 2021; Borisov and Korobov, 2009). Such extensive alteration of natural landscapes is an important example of humans adapting the environment for their needs. This type of sites, similarly to fortified settlements, is easily identifiable by visual observation of an area. However, the most effective way here is the use of aerial and satellite images, allowing to identify and observe large-scale structures in their entirety.

Places of Extraction of Mineral Resources (Mines, Quarries, Pits, etc.)
Places of extraction of minerals constitute a separate category of archaeological sites, varying in their purpose and organization. For example, mines or pits used for the extraction of metal ores were recorded since the Eneolithic, when the technology for obtaining metal from ore was first discovered. The main difficulty in working with these sites is their poor state of preservation. Very often they are severely damaged by subsequent workings or mining activity, and due to the lack of diagnostic archaeological finds, they can be difficult to date.

Another common example of resource extraction sites are quarries. Stone was widely used both for the construction of residential buildings, fortresses, burial construction, and ritual buildings. Good examples are the quarries of ancient Egypt and Sudan, which supplied stone blocks for the construction of palaces, temples and pyramids (Klemm and Klemm, 2008; Cech et al., 2018).

Workshops and Industrial Sites (Stone Splitting, Metallurgy, etc.)
A fairly common type of archaeological sites are workshops or industrial areas. They are known since the Stone Age, when they appeared in form of flint knapping workshops (Tarasov and Nordqvist, 2022). The main purpose of these sites is the primary processing of extracted resources. Raw material deposits were often in hard-to-reach places at a great distance from stationary settlements. Primary processing sites emerged to reduce the expenses of transportation and were located near the mining sites.

The most striking examples are metallurgical workshops. Transportation of ore is extremely inefficient, since the rock wastes accounts for the majority of original mass of the extracted ore. Therefore, smelting sites were arranged in close proximity to the mines, which often also were in areas rich in wood for charcoal production. The use of hazardous materials additionally justified the territorial isolation of workshops and industrial sites. Most often, this was related to blacksmiths, ceramic workshops, and other industries associated with open fire.

Infrastructure Sites (Roads, Moors, Piers, Canals, Aqueducts, etc.)
The development of human society is directly related to communication and provision of transport routes. At the initial stage infrastructure sites left practically no traces, but as the technology developed, the evidence of their construction became more and more prominent (Harding, 2000: 173–185). Roads needed paved surfaces, which required complex technology. The best examples of well-preserved transport arteries are Roman roads (Laurence, 1999) (Fig. 4), and the Inca road network in South America (Hyslop, 1984). Waterways were equally important. Two main types of archaeological sites can be distinguished in this category. Firstly, mooring quays, piers and other similar structures that ensure the mooring of ships. Their importance is especially high to ensure the speed and safety of loading and unloading of ships. Secondly, canals provide communication between various water basins or allow the delivery of bulk materials by water, as close as possible to the production and consumption sites. An example of the latter type is the network of canals in the UK that supported the industrial revolution. However, infrastructure facilities are not limited to land roads and waterways. They include, for example, Roman aqueducts, which delivered water to large cities for a variety of purposes: feeding fountains and city baths, watering gardens, providing water to industries and sewage facilities, etc. (Fig. 5).


Sign in to download full-size image
Fig. 4. Ancient road in Pompeii (Italy).


Sign in to download full-size image
Fig. 5. The aqueduct in Segovia (Spain).

Random/Haphazard Deposition
This category requires its own special recognition and interpretation. If the placement of settlements, workshops and other sites described above was a deliberate action tied to certain conditions, the random deposition occurs spontaneously. Its character usually does not allow targeted research, therefore, such sites are usually discovered accidently, often as a result of modern economic activity.

Haphazard, Isolated or Singular Finds
This large category of artifacts is represented by a significant number of items kept in museums. Most often, these items were found by local residents as a result of their daily activities, such as during deep plowing of fields. Unfortunately, such finds provide only limited information, as they lack archaeological context. Haphazard finds can also occur during archaeological survey.

Battlefields
These sites formed spontaneously as a result of military operations. In rare cases, it is possible to find the remains of warriors with traces of trauma that led to their death, as, for example, in the Tollensee River valley in Mecklenburg—Vorpommern (Brock, 2015). However, this rarely happens, since most often the bodies were buried, and ammunition and weapons were collected after the battle. Battlefields usually retain only some traces of the battles: arrowheads or bullets, damaged small items of equipment. To study this unique type of sites, special research methods are often used to reconstruct the actions of the opposing sides.

Hoards as Temporary Deposits
The classification of hoards as random deposits is based on the fact that their discovery cannot be predicted or planned. As a rule, they are found by chance and most often by people not related to academic archaeology. It is assumed that the hoard-makers originally intended to retrieve the hoard, but for some reason this never happened (Bochkarev and Klimushina, 2022). The first hoards appear in the Stone Age, and they continue to be deposited to this day. They may include items made from various materials: ceramics, bones, horn, glass, metal, etc., although since the Eneolithic, metal hoards become widespread. They can be divided into treasure, foundry workers', merchants', and household hoards. Votive deposits (“ritual hoards” or “sacral hoards”) will be considered in the class of sacral sites.

Shipwrecks
Shipwrecks are very particular and informative sites. They also belong to the random deposit type, as they were rarely deliberately sunk, and are studied by underwater archaeology or by recovery and further study and conservation in traditional ways (Cederlund, 2006). Shipwrecks provide information about the ship itself, its designs and equipment, as well as information regarding its cargo, which allows to analyze traffic flow, volumes of goods transported and other details of the transport infrastructure and trade (Bass, 1987; Pulak, 2005). Other research concerns military affairs based on the combat ammunition of ships and their special structural elements (e.g., rams).

Human Remains
A rare form of spontaneous deposition are the bodies of people who died accidently or were killed and not buried. The best-known case is Ötzi (an ice mummy of a Bronze Age man) discovered in 1991 in the Ötztal Alps in Tyrol (Fowler, 2001). The rarity of such sites is due to the unique conditions required to preserve the organic remains. Under normal conditions, a body decomposes or is taken away by animals and thus the information gets lost. One of the characteristic features of such sites is the preservation of all everyday equipment, in contrast to burials and their strictly regulated set of grave goods.

Sacral Sites
Burial Sites
This category unites all cases related to funerary practices, regardless of their form. Since ancient times, all actions performed after the death of a person follow a strictly regulated ritual. The most abundant type of burial sites is cemeteries: a territory specifically allocated for burials, ranging from a few to tens of thousands of burials. Burial sites vary widely in type, and only the most common options are further discussed. Moreover, a burial is not always defined by the presence of human remains (inhumation, cremation), but also include cenotaphs, i.e. burials that do not contain human remains in any form.

Burial Grounds
This type of sites appeared in the most ancient periods of human history. The main distinguishing feature is the absence of pronounced near-tomb or grave structures (fences, barrows, memorials, etc.). Most often, burial grounds consist of rows of buried graves, sometimes with wooden structures which are usually not preserved (Molodin, 2012). Soil burial grounds are among the most difficult types of sites to identify. The absence of tomb structures leads to the lack of any visual hints that could help site identification. Such sites are usually found during field excavations; under certain conditions, remote sensing can be fruitful as well.

Burial Mounds
An extremely common type of sites, characterized by the presence of a stone, earth or combined mound or barrow over the burial structure (Korenevsky, 2012). Their dimensions can vary; the surviving height of the barrow of the royal Scythian burial mounds in the Black Sea region, for example, exceeded 20 m (Galanina, 1997; Čugunov et al., 2010). Most often, mounds have a variety of adjacent structures composing a single burial site: a fence, ditches, menhirs, or memorials. Usually mounds are connected to burial grounds, which are ancient cemeteries associated with one or more adjacent settlements. The tradition of erecting burial mounds is widely present in societies relying on cattle breeding as the main form of economic activity (Fig. 6).


Sign in to download full-size image
Fig. 6. A burial mound in the Salbyk Valley (Republic of Khakassia, Russia).

Tombs and Shrines (Complex Structures—Pyramids, Shaft-Type Tombs, Mausoleums, Dolmens, etc.)
The next level of complex burial practices are tombs or shrines. This group of sites is very diverse in terms of its characteristic features and defined by complex constructions and the presence of a tomb entrance or “dromos.” This category includes both Egyptian pyramids and shaft tombs, as well as mausoleums, dolmens and other similar structures (Lehner, 1997; Arnold, 2003). Unlike burial mounds, they are more characteristic of societies and civilizations leading a sedentary lifestyle.

Ritual Sites
This category concerns the performance of ritual actions that are not always associated with the death of a person and/or their burial. Any evidence of rituals, worship of gods, shamanic rites and other similar actions may falls into this category. Unfortunately, it is hardly possible to understand the meaning of these rituals, especially in the absence of literary sources in the earlier stages of human history. It can be only assumed that the rituals would seek help of spirits, gods or natural elements. In order for these requests to be accomplished, it was necessary to follow certain rules and perform rituals, accompanied by the necessary accessories and surrounding details. Studying ritual structures and images, archaeologists try to reconstruct rituals observing their traces and “setting” in which they were carried out.

Ritual Platforms and Places of Sacrifice
The simplest form of ceremonial constructions are ritual sites (Harding, 2000: 309–313). Most often, these are specific places of natural origin, which were perceived by ancient people as something beyond the ordinary. These can be either viewing platforms on top of hills or rocks, or places of worship “hidden” from strangers. Sometimes places where objects of worship were installed can be traced: most often these can be wooden poles with carved images. It was probably believed that the “feature” of this place allows one to establish a closer contact with the spirits or gods to whom the sanctuary was dedicated. An important element of worship was the offering of “gifts”. From an archaeological perspective, it is these “gifts” that make it possible to identify and date such ritual sites.

A particular variant of ritual sites are megaliths. These objects were made of huge stone blocks, which required an extensive workforce to procure and arrange. The grandeur of these structures emphasized the importance of the ceremonies and enhanced the sanctity of the place. The most famous megalith site is Stonehenge in Wiltshire, UK (Chippindale, 2012). Unfortunately, even such complex sites do not provide us with an understanding of the nature of the rites.

Temple-Related Structures
Temple structures become a logical result of the development of ritual sites and megaliths (Medieval temple Archaeology, 2017). Their main distinction is the organization of a closed space for rituals. Unlike in previous periods, when ceremonies were held in the open, temples allowed to “hide” them from strangers' eyes. This is probably the result of several processes, such as urbanization, the coexistence of representatives of different religions and beliefs within one settlement, and the development of the idea of creating a “special” place. Temples can vary significantly in their design and building materials.

Rock and Cave Paintings, Geoglyphs
Among the most amazing phenomena preserving evidence of the spiritual life of ancient people are images applied to various surfaces (Fig. 7). The themes of such images are extremely diverse—from individual signs, tamgas and ornaments, to images of people or animals, to some plot or story-telling compositions. The tradition of drawing on the walls of caves, rocks, loose stones, as well as the surface of deserts, originated in the Paleolithic (White, 2003; Zhitenev, 2018) and continued to develop until ethnographic modernity.


Sign in to download full-size image
Fig. 7. Rock image of Kalbak-Tash I (Altai, Russia) (Devlet and Seog-Ho, 2014)

Rock paintings are found all over the world. They are almost omnipresent in places with a significant number of stone slabs available. There are two main methods of drawing execution: painting and engraving or scratching. Unfortunately, the images executed using paint survive rarely. However, where they do, they require huge efforts for their further preservation. Images applied by punching or scratching are more widespread and durable (Poikalainen and Ernits, 1998; Devlet and Devlet, 2011; Kolpakov and Shumkin, 2012; Helskog, 2014). They are also subject to weathering, but not to the same extent as painted images.

A very special type of archaeological sites are geoglyphs. These are huge ground images. The most famous of these are drawings in the Nazca desert in South America (Aveni, 2000; Lambers, 2006). Several hundred drawings, about 700 geometric images and over 13,000 individual lines or their groups are known to date, and new images continue to be discovered as a result of joint research by scientists from Japan and Peru.



क न सुटलेलं कोड आणि महाभारत चक्रव्यूह (कोड्याचं माळ , योगेवाडी , तालुका - तासगाव , जिल्हा - सांगली )

जगातील एक मोठं महाकाव्य म्हणून महाभारत प्रसिद्ध  आहे. भारतीय समाजाचे आर्थिक, सामाजिक , राजकीय , कौटुंबिक प्रतिबिंब आपल्याला त्यामध्ये दिसते . आजही आपल्या देशात , समाजात त्याच्या खाणाखुणा दिसतात .
त्यातील माझ्या गावाजवळच्या एका गोष्टीचा संबंध गेल्या काही दिवसापूर्वी आला . योगेवाडी जवळचे कोड्याचे माळ . आजवर अनेक दंतकथा या माळाबद्द्दल व तेथील कोडयाबद्द्दल ऐकलेल्या आहेत . जसेकी कलावंतीण बाईचे कोडे , राक्षसाचा खेळ इत्यादी . पण थोडीफार मनाला पटलेली माहिती गेल्या काही दिवसापूर्वी मिळाली .
महाभारतातील कुरुक्षेत्र युद्ध आणि अभिमन्यू वध आपणाला माहीतच आहे . युद्धाच्या त्या दिवशी द्रोणाचार्यांनी त्यांच्या सैन्यामध्ये 'चक्रव्यूह ' रचना केली होती आणि अभिमन्यू त्यामध्ये मारला गेला . त्याला आत जायचा कसा हे माहित होत पण बाहेर पडायचं कसा हे माहित नव्हता आणि पुढची स्टोरी तुम्हाला माहितीच असेल .
तर मुख्य मुद्दा त्या चक्रव्यूह रचनेचा , ती रचना तेंव्हा आणि त्यानंतर भारतात , भारतीय समाजात , संस्कृतीमध्ये खूप रुजली . लोकांनी चित्र काढण्यासाठी , रांगोळी , भिंती रंगवणे , कपड्यावरचे नक्षी यामध्ये त्या रचनेचा उपयोग केला . आजही उत्तर भारतात जुन्या मंदिरामध्ये  दगडावर कोरलेली , जुन्या भिंती चित्रात दिसते .
आणि आपल्या कोड्याच्या माळावरचे ते रचनाकार ठेवलेले दगड हे ती चक्रव्यूह रचनाच आहे , याची रचना मध्ययुगीन भारतात झाली असावी . तेंव्हा सिनेमा , TV , मोबाईल वगैरे काही नव्हते  त्यामुळे  करमणुकीच्या हेतूने याचा उपयोग केला असावा .
आज याठिकाणी tourism साठी चांगला वाव आहे . शेजारी मणेराजुरी मोठा तलाव हि आहे जो इथल्या निसर्ग सौन्दर्यात अजून भर टाकतो  योग्य नियोजन केले तर लोकांना १ day trip पण होईल आणि ग्रामपंचायतीला चांगला महसूल हि भेटेल .
कोणत्याही गोष्टीत अडकणे सोपं पण बाहेर पडणं खूप अवघड . ती रचना आणि चक्रव्यूह आपणाला तेच शिकवते . बाहेर आता आलं पाहिजे अडचणी असो वा संकट तरच अर्जुन बनता येईल . त्यासाठी श्री कृष्णासारखा सारथी मार्गदर्शक पण आपल्याला नेहमी जवळ ठेवावा लागेल .

ठिकाण -
कोड्याचे माळ
(योगेवाडी / मणेराजुरी , तालुका - तासगाव , जिल्हा - सांगली )

माहिती आणि लेखन -
डॉ . शशिकांत पाटील , संदीप पाटील







Menhirs, Stelae, and Statues
धार्मिक रचनांचा एक वेगळा प्रकार म्हणजे विविध दगडी शिल्पे ( ओल्होव्स्की, २००५ ). हे एकतर प्रतिमांचे कोणतेही चिन्ह नसलेले साधे दगड असू शकतात किंवा लोक, देव किंवा संपूर्ण मिथकांचे चित्रण करणारी जटिल शिल्पे असू शकतात ( आकृती ८ ). यापैकी काही दगड दफनविधींशी संबंधित असू शकतात, परंतु बहुतेक भागांसाठी ते पूजेचे वस्तू आहेत आणि कदाचित, धार्मिक स्थळांशी संबंधित आहेत. अशा शिल्पांचे एक उल्लेखनीय उदाहरण म्हणजे "हरण दगड", जे युरेशियन स्टेप आणि लगतच्या पर्वतीय प्रणालींमध्ये आढळतात ( सॅव्हिनोव्ह, १९९४ ; व्होल्कोव्ह, २००२ ). बहुतेकदा, ते व्यक्ती आणि त्यांच्या कपड्यांचे घटक (पट्टा), दागिने (लौकिक अंगठ्या, हार) आणि लष्करी पोशाख (खंजीर, चाकू, पंचियन, कुऱ्हाड, धनुष्य इ.) योजनाबद्धपणे दर्शवतात. चेहरा सहसा अनेक तिरकस रेषांनी दर्शविला जातो आणि दगडावरच प्राण्यांच्या असंख्य प्रतिमा असू शकतात, प्रामुख्याने हरण, ज्यामुळे या विशेष स्टीले गटाला हे नाव मिळाले. ते उत्तरार्धातील कांस्य युग आणि सुरुवातीच्या सिथियन काळातील आहेत. जटिल प्रतिमा असलेले दगडी स्टीले बसवण्याच्या आणखी प्राचीन परंपरा आहेत. उदाहरणार्थ, ते मध्य येनिसेईच्या ओकुनेव्हो संस्कृतीत आणि उत्तर काळ्या समुद्राच्या प्रदेशातील यमनया संस्कृतीत व्यापक आहेत ( लेओन्टीव्ह एट अल., २००६ ).









पूर्ण आकाराची प्रतिमा डाउनलोड करण्यासाठी साइन इन करा.
अंजीर 8 . एक हिरण दगड, मंगोलिया ( कोवालेव आणि एर्डेनेबातर, 2021 )

व्होटिव्ह डिपॉझिट
व्हॉटिव्ह ठेवींना एका विशेष प्रकारच्या पुरातत्वीय स्थळांप्रमाणे वेगळे केले पाहिजे. ते मूलभूतपणे तात्पुरत्या साठ्यांपासून वेगळे आहेत, जरी ते त्यांच्या आशय आणि संदर्भात त्यांच्यापेक्षा बरेचदा थोडे वेगळे असले तरी. परिणामी, खजिना हा शब्द देखील त्यांना अनेकदा वापरला जातो. तथापि, त्यांचे स्वरूप मूलभूतपणे वेगळे आहे. व्हॉटिव्ह ठेवींचे एक स्पष्ट उदाहरण म्हणजे कांस्य युगातील अनेक युरोपीय साठे. हे देवांना भेटवस्तू होते, ज्यांच्याकडून लोकांनी मदत मागितली ( हॅन्सन, २०१३ : २७९). दुर्दैवाने, यापैकी बहुतेक व्हॉटिव्ह ठेवींमध्ये पुरातत्वीय संदर्भ नसतो, कारण ते सहसा गैर-विद्वानांकडून मिळवले जातात.

वाघबीळ " उर्फ " नाचणटेपाची गुहा "
किंवा " गन्स ऑफ पाचाड "
🚩 जि.रायगड

राजधानी रायदुर्गाच्या पश्चिमेकडील डोंगरामध्ये
एक निसर्गनिर्मित अश्मयुगीन गुहा आहे.
गुहेचे मुख्य वैशिष्ट्य म्हणजे तिला तीन तोंडे आहेत.
जगात अशा प्रकारच्या दोनचं गुहा आहेत एक युरोपातील
"गन्स ऑफ नेव्हरॉन" आणि दुसरी म्हणजे ही "वाघबीळ"

या गुहेची दोन तोंडे पाचाडकडे तर एक तोंड रायगडवाडीकडे आहे. एकाचवेळी दोन्ही बाजूचा परिसर
या गुहेतून न्याहाळता येतो. शिवस्वराज्यात या गुहेतून पाचाडकोट आणि रायदुर्गावर नजर ठेवली जातं असेल, यात काही शंका नाही,तशी ती टेहळणीसाठी उत्तम जागा आहे.रायगडवाडीकडील अर्धवर्तुळाकार गुहेतून रायदुर्गाचे मनमोहक दृश्य दृष्टीक्षेपास पडते. तसेच कोकणदिवा, कावल्या-बावल्या खिंड आणि पावसाळ्यात कोसळणारे अनेक धबधबे याचे विहंगम दृश्य पहावयास मिळते.
दुसऱ्या बाजूच्या गुहेतून जिजाऊंचा पाचाडकोट नजरेस पडतो.

1) नाचणटेपाची गुहा:-
नाचण म्हणजे 'नाचणी' आणि टेप म्हणजे 'छोटी टेकडी'.नाचणी हे कोकणवासीयांचे प्रमुख धान्य आहे,ते साठवून ठेवण्यासाठी या गुहेचा वापर केला जातं असे.
त्यामुळे 'नाचणटेपाची गुहा' हे स्थानिकांनी दिलेले नावं आहे.

2) वाघबीळ:-
पाचाड कोट परिसरातून या गुहेकडे पाहिल्यावर तिचे दोन
धिद्र हे वाघाच्या डोळ्यासमान दिसतात. त्यामुळे 'वाघबीळ' हे नावं देण्यात आले.

3) गन्स ऑफ पाचाड:-
वाघबीळ गुहेप्रमाणेच युरोपातील 'गन्स ऑफ नेव्हरॉन' या गुहेलाही तीन तोंडे आहेत. त्यामुळे इंग्रजी भाषेवर अधिक प्रेम करणाऱ्यांनी या गुहेला 'गन्स ऑफ पाचाड' नावं दिले आहे.

वाघबीळ अथवा नाचणटेपाची गुहा - किल्ले रायगड
mb_130920
4–5 minutes
रायगड – महाराष्ट्राच्या इतिहासात सुवर्णाक्षरांनी लिहिला गेलेला किल्ला. छत्रपती शिवाजी महाराजांची राजधानी, स्वराज्याचे प्रतिक. या किल्ल्याच्या आसपास अनेक ऐतिहासिक व नैसर्गिक स्थळे आहेत, परंतु काही स्थळे आजही सामान्य लोकांच्या माहितीच्या बाहेर आहेत. त्यापैकीच एक म्हणजे – वाघबीळ अथवा नाचणटेपाची गुहा, ज्याला "गन्स ऑफ पाचाड" या नावानेही ओळखतात.

वाघबीळ – इतिहासाच्या गर्भात लपलेली नैसर्गिक गुहा
वाघबीळ ही एक नैसर्गिक गुहा असून ती पाचाडहून रायगडच्या दिशेने चढताना, चीत दरवाज्याच्या विरुद्ध दिशेला असलेल्या डोंगरात वसलेली आहे. ही गुहा समुद्रसपाटीपासून सुमारे ४५० मीटर उंचीवर स्थित आहे. वाघबीळ ही केवळ एक गुहा नसून ती निसर्ग, इतिहास आणि भूगर्भशास्त्र यांचं एक अद्वितीय मिश्रण आहे.

गुहेचा पुरातन काळ व अश्मयुगीन संदर्भ
वाघबीळ ही अश्मयुगातल्या नैसर्गिक गुहांपैकी एक मानली जाते. संशोधकांनी येथे अश्मयुगीन मानवाने वापरलेली दगडी हत्यारे शोधून काढली आहेत, जे या गुहेच्या प्राचीनतेचा पुरावा आहेत. राजगड किल्ल्यावर असलेल्या नेढ्यांप्रमाणे या गुहेची रचना असूनही, हिचा अंतर्भाग अधिक प्रशस्त आणि खोल आहे. यामुळे ही गुहा कोकणातील 'हातखंबा गुहा' याच्याशी साम्य दर्शवते.

गुहेची रचना व प्रवेशद्वारे
वाघबीळची रचना खूपच वैशिष्ट्यपूर्ण आहे. या गुहेला एकूण तीन तोंडे आहेत:

पश्चिमेस दोन लहान तोंडे

पूर्वेस एक मोठे प्रवेशद्वार

आजच्या काळात या पूर्वेकडील मोठ्या तोंडामधूनच प्रवेश केला जातो. गुहेचा आतला भाग प्रकाशमान, हवेशीर आणि मोकळा आहे. एकावेळी सुमारे २५ माणसे सहज राहू शकतात, इतकी ही जागा आहे. हे दर्शवते की ही गुहा फक्त वन्य प्राण्यांचा आसरा नव्हे तर मानव व पहारेकरी यांचाही मुक्कामस्थान होती.

गुहेचे ऐतिहासिक महत्त्व
या गुहेचे ऐतिहासिक महत्त्व फार मोठे आहे. गुहा पश्चिमेकडील पाचाड व पूर्वेकडील रायगडवाडी या दोन महत्वाच्या मार्गांवर लक्ष ठेवण्यासाठी अतिशय महत्त्वाची होती. यामुळे येथे पहारा व तोफा ठेवण्याची व्यवस्था केली जात असे.

विशेषतः १७७३ साली रायगडवर झालेल्या मोर्चेबंदीच्या वेळी, या गुहेचा उपयोग तोफेच्या धमधमे रचण्यासाठी केला गेला होता. त्यावेळी रायगडाच्या चार प्रमुख बाजूंना मोर्चे बांधले गेले होते:

चीत दरवाजा जवळ

रायगडवाडी येथे

घळकीच्या मेटाजवळ

नाचणटेपाजवळ (वाघबीळ जवळ)

या मोर्च्यांमध्ये नाचणटेपाजवळील वाघबीळ गुहा रणनितीच्या दृष्टिकोनातून फार महत्त्वाची ठरली होती.

वाघबीळ, नाचणटेप, गन्स ऑफ पाचाड
या गुहेची अनेक नावे आहेत आणि प्रत्येक नावामागे एक खास अर्थ आहे:

वाघबीळ – गुहेस वाघाचे बिळासारखा आकार असल्यामुळे हे नाव पडले असावे.

नाचणटेपाची गुहा – वाघबीळ डोंगरावर एक पठार आहे ज्याला "नाचणटेप" म्हणतात. त्यामुळे त्या पठाराशी संबंधित गुहा म्हणून हे नाव.

गन्स ऑफ पाचाड – इतिहासात पाचाड येथून या गुहेतून शत्रूपथावर नजर ठेवण्यासाठी व तोफा ठेवण्यासाठी याचा उपयोग होत असे.

आज रायगड किल्ल्याला भेट देणारे हजारो पर्यटक राजवाडा, महादरवाजा, टकमक टोक, गंगासागर तलाव, बाजारपेठ इ. बघतात. पण या वाघबीळ गुहेकडे फार थोडे लोक वळतात. निसर्गप्रेमी, इतिहास संशोधक, ट्रेकर्स आणि साहसी पर्यटकांसाठी ही गुहा एक खजिनाच आहे.

पाचाडहून चढाई करताना ही गुहा मध्यभागीच लागते. त्यामुळे गडावर जाणाऱ्या मार्गात एक छोटासा वळसा घालून या गुहेला अवश्य भेट द्यावी.

भेट देताना घ्यावयाची काळजी
गुहा नैसर्गिक असल्याने प्रकाशाची मर्यादा असते – टॉर्च किंवा मोबाईल लाइट जवळ ठेवा.

गुहेच्या तोंडावर व आतील भागात सरपटणारे किंवा वन्य प्राणी असू शकतात – त्यामुळे काळजीपूर्वक प्रवेश करावा.

प्लास्टिक किंवा कचरा टाकू नये – ही एक ऐतिहासिक व नैसर्गिक वारसा आहे.

स्थानिक मार्गदर्शक घेतल्यास अधिक माहितीपूर्ण अनुभव मिळू शकतो.

वाघबीळ – रायगडाच्या इतिहासातील एक दुर्लक्षित रत्न
रायगड म्हणजे भवतालची नैसर्गिक रचना, रणनितीची व्यवस्थापनशैली आणि अद्भुत वास्तुकला यांचे संगमही आहे. वाघबीळ ही त्यातीलच एक उपेक्षित पण ऐतिहासिक आणि भौगोलिक दृष्टिकोनातून अत्यंत महत्वाची गुहा आहे.

आजच्या पिढीने या अशा दुर्लक्षित ठिकाणी भेट देऊन त्याचे संरक्षण आणि संवर्धन करणे हे आपले कर्तव्य आहे.

वाघबीळ किंवा नाचणटेपाची गुहा ही रायगडाच्या अंगाखांद्यावर वसलेली एक गूढ आणि आकर्षक जागा आहे. इतिहास, भूगोल, पुरातत्व आणि निसर्ग यांची सांगड असलेल्या या गुहेकडे आजही फारसा प्रकाश टाकला गेलेला नाही. ही गुहा एकदा तरी अनुभवायला हवीच!

गन्स ऑफ पाचाड | थिंक महाराष्ट्र
लेखकाचा दूरध्वनी 8793161028
2–3 minutes
_Pachad_1.jpg

रायगड किल्ल्याला भेट देताना पाचाड सोडले की डावीकडील डोंगरामध्ये तीन तोंडांची गुहा गिर्यारोहकांना खुणावते. पाचाडकडून त्या गुहेकडे पाहिले असता ती वाघाच्या मुखासारखी जागा दिसते. तीन तोंडे असणारी ती गुहा सह्याद्रीमधील सुंदर अलंकार आहे. गुहा नैसर्गिक असली तरी गुहेचा वापर अश्मयुगीन काळापासून होत आलेला आहे. गुहेला मराठीमध्ये वाघबीळ किंवा नाचणटेपाची गुहा असे नाव आहे.

त्या ठिकाणी डेक्कन कॉलेजचे अभ्यासक आर. व्ही. जोशी यांनी उत्खनन केले. त्यांना कोअर्स, तासण्या, छिलके, टोकदार पाती, नोक, वेधण, ट्रॅपिझ, आणि त्रिकोणी पद्धती मध्ये कोरलेल्या काही अवजारांचा आणि हत्यारांचा भाग मिळाला. त्या साधनांमुळे या नैसर्गिक गुहेमध्ये अश्मयुगीन मानव वास्तव्य करून असावा हे समजून आले. ती गुहा अत्यंत सुंदर आहे, परंतु गुहेच्या ठिकाणी पाण्याचा स्रोत मात्र सापडत नाही. पूर्वी तेथे काही ना काही पाण्याचा स्रोत असावा असे खात्रीपूर्वक वाटते.   

रायगडावर येणाऱ्या वाटांवर लक्ष ठेवण्यासाठी ‘वाघबीळ’ किंवा ‘नाचणटेपाची गुहा’ इतकी उत्कृष्ट जागा कोणतीही नाही. ह्या गुहेला पाचाडच्या दिशेला दोन तोंडे आहेत. पण तिकडून गुहेत प्रवेश करता येत नाही. अश्मयुगीन गुहेत प्रवेश करण्यासाठी रायगड वाडीच्या दिशेला तोंड आहे. पाचाड खिंडीतून हॉटेलच्या मागून त्या ठिकाणी येण्यास छोटीशी सोपी वाट आहे. गुहेतून दुर्गदुर्गेश्वर रायगडचे सुंदर दर्शन होते.

गुहेमधील घोंगावणारा वारा आयुष्यात एकदा तरी अनुभवावा. मात्र या विशुद्ध नैसर्गिक जागेला कोणतीही हानी न पोचवता ‘वाघबीळ’ किंवा ‘नाचणटेपाची गुहा’ येथील मुक्काम जरूर करावा. अश्मयुगातील मानवी जीवन काय असू शकेल याची उजळणी मात्र नक्की करता येईल.



अश्मयुग : मानवी इतिहासातील अतिप्राचीन कालखंड. हा सु. पाच लाख ते दहा हजार वर्षापूर्वीपर्यंत साधारणत: मानण्यात येतो. सर्वसाधारणपणे माणसाला लेखनकला अवगत होण्यापूर्वीच्या इतिहासास

 ⇨ प्रागितिहास  म्हणतात. प्रागैतिहासिक काळापैकी एका सांस्कृतिक अवस्थेस, म्हणजे जेव्हा प्रामुख्याने दगडाचाच उपयोग हत्यारांसाठी केला जात होता त्या काळास ‘अश्मयुग’ असे म्हटले  जाते. यात मानवास कोणताही धातू व धातूचा जाणीवपूर्वक उपयोग माहीत नव्हता. प्रागितिहासाचा जवळजवळ चारपंचमांश भाग अश्मयुगानेच व्यापला आहे. अश्मयुगातील मानव त्याच्या भोवती असणाऱ्या लाकडे, हाडे, दगड इत्यादींचा उपकरणे व हत्यारे बनविण्यासाठी उपयोग करीत होता. त्यांपैकी लाकूड व हाडे सहज नाश पावणारी असल्याने या पदार्थांची आयुधे वा उपकरणे मानवी वस्त्यांच्या अवशेषांत सहसा आढळत नाहीत. मात्र दगड टिकाऊ असल्याने त्याची उपकरणे व आयुधे पुष्कळ सापडतात. यावरूनच या कालखंडास ‘अश्मयुग’ असे नाव देण्यात येते.

अश्मयुगातील माणूस सर्वत्र एकाच प्रकारची आयुधे वापरीत होता किंवा एकाच पद्धतीचे जीवन व्यतीत करीत होता असे समजणे चुकीचे ठरेल. स्थलकालपरत्वे वेग व दिशा भिन्न असल्या तरी त्याच्या जीवनात प्रगती निश्चितच होती. ही मानवी प्रगती दर्शविण्यासाठी अश्मयुगाचे पुराणाश्मयुग, मध्याश्मयुग किंवा आंतराश्मयुग आणि नवाश्मयुग असे तीन मुख्य टप्पे कल्पिण्यात आले आहेत. त्यांतही पुराणाश्मयुगाचे पूर्व- पुराणाश्मयुग, मध्यपुराणाश्मयुग आणि उत्तरपुराणाश्मयुग असे पुन्हा तीन उपविभाग पाडले आहेत. या सर्व संज्ञा मुख्यतः यूरोपातील संशोधनांतून उत्पन्न झाल्या. इतर खंडांत प्रागैतिहासिक संशोधनाचा विकास सुरू झाल्यावर असे दिसू लागले, की तेथील प्रगतीची स्तबके काहीशी भिन्न असून वरील संज्ञा त्यांना चपखलपणे लागू पडत नाहीत. नवाश्मयुगापूर्वी पूर्व, मध्य व उत्तर अशी तीनच अश्मयुगे कल्पावी असे आफ्रिका, अमेरिका व भारत येथील काही पुरातत्त्वज्ञ समजत. परंतु स्थलविशेषामुळे उत्पन्न झालेल्या पारिभाषिक संज्ञांचा आशय अद्यापही निश्चित झालेला नाही. म्हणून सर्वत्र यूरोपीय संज्ञाच वापरण्यात आल्या आहेत.

अश्मयुगाच्या उपर्युक्त विभागांची सांस्कृतिक वैशिष्ट्ये स्थूलमानाने पुढीलप्रमाणे होत. यांच्या कालमर्यादांत स्थलभेदानुसार फरक आहेत. 

अश्मयुगीन कालखंड

 पूर्वपुराणाश्मयुग : याचा काळ सामान्यपणे पाच लाख ते दीड लाख वर्षांपूर्वीपर्यंतचा समजण्यात येतो. काही भूप्रदेशांत दहा हजार वर्षांपूर्वीपर्यंत हीच सांस्कृतिक अवस्था चालू होती. या काळात ग्युंझचा (पहिल्या हिमयुगाचा) आरंभ, येथपासून ते रिसच्या (तिसऱ्या हिमयुगाच्या) पहिल्या चरणापर्यंतचा भूस्तरीय काळ समाविष्ट होतो. अत्यंत कडाक्याची थंडी आणि तीव्र उष्णता असे विषम हवामान आणि तेही वारंवार बदलणारे, त्यामुळे पृथ्वीवरील वनस्पतिजीवनात मोठे फेरफार होत गेले. वृक्षराजी, दाट जंगले व गवताळ प्रदेश यांचे पट्टे उत्तर-दक्षिण असे सरकत राहिले. त्यामुळे जीवसृष्टीही बदलत गेली. आता नष्ट झालेले, सरळ दातांचे भीमगज व तत्सम इतर प्राणी, तसेच पाणघोडे, गेंडे, अस्वले, गवे, सांबरे, घोडे, हरणे असे कितीतरी प्राणी मानवाच्या अवतीभोवती वावरत होते. या प्राण्यांची शिकार हेच प्रमुख उपजीविकेचे साधन होते. वंशशास्त्रदृष्ट्या ज्याचा उल्लेख करता येणार नाही, पण तत्सदृश असे ऑस्ट्रेलोपिथेकस (Australopithecus), पिथेकॅन्थ्रापस (Pithecanthropus) व निअँडरथल (Neanderthal) हे मानवसदृश प्राणी पृथ्वीवर वावरत होते. पण त्यांचा वावर भूपृष्ठाच्या एकपंचमांश क्षेत्रापुरताच मर्यादित होता. अमेरिका व ऑस्ट्रेलिया या खंडांत जवळजवळ वस्ती नव्हतीच. सांस्कृतिक दृष्ट्या या माणसांचे पाच गट पाडण्यात येतात. ते असे : व्हिलाफ्रांकिअन (Villafranchian)–पहिल्या हिमयुगाच्या पहिल्या चरणात अबेव्हिलिअन (Abbevillian)–पहिल्या आंतरहिमयुगाच्या पहिल्या चरणात क्लॅक्टोनियन (Clactonian)–पहिल्या आंतरहिमयुगाच्या दुसऱ्या व तिसऱ्या चरणांत अश्यूलियन (Acheulian)–दुसऱ्या आंतरहिमयुगाच्या प्रथमार्धात व लेव्हालेइशियन (Levalloisian)–दुसऱ्या आंतरहिमयुगाच्या उत्तरार्धापासून पुढे. तंत्रविशेषां- वरून समजांचे वरील गट पाडण्यात आले आहेत. त्यामध्ये वांशिक भेद अभिप्रेत नाहीत. पूर्वपुराणाश्मयुगातील दगडी आयुधांत प्रामुख्याने तीन तंत्रे वा तंत्रप्रकार दिसतात. पहिला हातकुऱ्हाडीचा असून त्यात गोट्याच्या दोन्ही बाजूंचे टवके उडवून हत्यारे करण्यात येत. यांत बदामी आकाराचे टोकदार हत्यार हे प्रमुख होते. यावरूनच त्यास हातकुऱ्हाडतंत्र हे नाव पडले. दुसरा प्रकार म्हणजे कोयत्यासारखे किंवा खाटकाच्या सुऱ्या- सारखे तुकडे तोडणारे दगड व तत्सम हत्यारे निर्माण करण्याचे तंत्र होय आणि तिसरा प्रकार दगडी छिलक्यांपासून वरील दोन्ही प्रकारची उपकरणे तयार करणे हा होता. पहिल्या प्रकारचे तंत्र यूरोप, आफ्रिका, पश्चिम आशिया येथे, तर दुसरे तंत्र चीन व आग्नेय आशिया यांत आढळते आणि तिसरे तंत्र प्रथम पॅलेस्टाइन व पुढे वायव्य भारतात दिसते. कालांतराने ते इतरत्रही पसरले. 

मध्यपुराणाश्मयुग: यात पन्नास हजार ते पंचवीस हजार वर्षांपूर्वीचा सर्वसाधारण काळ येतो. तिसऱ्या आंतरहिमयुगाचा उत्तरार्ध आणि व्यूर्मची ( Wurm–चौथ्या हिमयुगाची ) सुरुवात, हे काळ ह्यात समाविष्ट होतात. ह्या काळातील हवामान अतिशीत असल्यामुळे क्वचित अधूनमधून जंगले आढळत. मात्र ह्या काळात उत्तर यूरोपात खुरट्या वनस्पतींचा प्रदेश होता. त्यात गुहांच्या आश्रयाने राहणारे केसाळ गवे, अस्वले, रान- बैल व गेंडे हे मुख्य प्राणी असत. या काळात यूरोप व पश्चिम आशिया या भागांत निअँडरथल मानवाची वस्ती होती. तो मुख्यत्वे गुहांतून वा प्रस्तरालयांतून राहत असे. त्यांतील काही गुहांतून चित्रकाम सापडले आहे. मौस्टेरियन (यूरोप) व लीव्हाल्लॉइसो-मौस्टेरियन (पश्चिम आशिया) हे ह्या काळातील दोन प्रमुख समाजगट होत. त्यांची हत्यारे लहान आकाराची, वाटोळी पण धारदार आणि वैशिष्ट्यपूर्ण होती. ती गोरगोटी दगडांच्या छिलक्यांची केलेली असत. ह्याशिवाय इतर उपकरणांत तासण्या, टोचे, बाणांच्या टोकासारखे लहान हत्यार यांचाही समावेश असे.

उत्तरपुराणाश्मयुग : हा काळ सर्वसाधारणपणे पंचवीस हजार ते दहा वर्षांपूर्वीपर्यंतचा समजण्यात येतो. या काळाचा आरंभ चाळीस हजार वर्षांपूर्वी झाला असावा, असेही एक मत प्रसृत आहे. यूरोपपुरता हा काळ निश्चित असून, चौथ्या हिमयुगात जी तीन हिमप्रसरणे झाली त्यांतील पहिल्या व दुसऱ्या प्रसरणांच्या मधल्या काळात मध्य यूरोप वा दक्षिण रशिया येथे याचा उदय झाला. ह्या काळातील हवा थंड असल्याने या भागातही खुरट्या वनस्पती आढळत. रेनडिअरसारख्या प्राण्यांचे कळप त्यामुळे सर्वत्र वावरत होते. तसेच भीमगजा- सारखे काही काही प्राणी दक्षिण यूरोपात होते. वंशशास्त्रज्ञ ज्याला ‘होमो सॅपियन’ असे नाव देतात त्याच्या क्रोमॅग्नन व कोम्ब कापेल ब्रून मानव ह्या दोन शाखा यूरोपात सर्वत्र पसरल्या होत्या. होमो सॅपियनला पूर्णार्थाने मानव समजण्यात येते. पश्चिम आशियातही ही संस्कृती दिसून येते. इतर खंडांतील या संस्कृतीचे अस्तित्व व स्वरूप याबाबत तज्ञांत एकमत नाही. पेरीगोर्डियन किंवा ऑरिग्नेशियन, सॉल्यूट्रीअन, मग्डलेनिअन हे मुख्य समाजगट त्या वेळी अस्तित्वात होते. नैसर्गिक गुहांचा निवासासाठी मोठ्या प्रमाणावर वापर केला जाई. त्यांत काही ठिकाणी चित्रकाम आढळले आहे. पारलौकिक जीवन आणि अतिमानुषी शक्ती यांसंबंधी येथे विचार असावा इतका पुरावा मृतात्म्यासंबंधीची थडगी व विधी ह्यांमधून ज्ञात होतो. गारगोटीच्या दगडाची पातळ व सरळ पाती असलेली संयुक्त आयुधे बनविण्यात येऊ लागली. पानाच्या आकाराची बाणाची टोके, तासण्या, टोचे (Awl-Burin) ही विशिष्ट आयुधेही ह्या काळात वापरात होती. लाकूड व शिंगे यांचाही हत्यारांच्या निर्मितीसाठी वाढता उपयोग करण्यात येऊ लागला होता.

आंतराश्मयुग : ह्याचा पंधरा हजार वर्षांपूर्वी आरंभ होऊन दहा हजार वर्षांपूर्वी त्याचे पूर्ण प्रगल्भावस्थेत रूपांतर झाले. तथापि त्याचे अस्तित्व अत्यंत मर्यादित होते. चौथ्या हिमयुगाच्या तिसऱ्या प्रसरणाच्या काळात ह्यास सुरुवात झाली. थंड हवेऐवजी पर्जन्यमानात हळूहळू वृद्धी होऊ लागली व त्यामुळे गवताळ जंगलांची वाढ झाली आणि जीवसृष्टी सध्यासारखी निर्माण झाली. क्रोमॅग्‍नन मानवाच्या वंशाचा सर्वत्र प्रसार झाला. त्याविषयीचा पुरावा यूरोप व पश्चिम आशिया या भागांत प्रामुख्याने आढळतो. इतर खंडांतील या विशिष्ट सांस्कृतिक स्तबकाचे स्वरूप व विस्तार यांविषयी फारशी माहिती ज्ञात नाही. अझिलियन, टार्डेनोइशिअन, ॲस्टुरियन, एर्टेबोल, पॅलेस्टाइन (यूरोप) नाटुफियन (उत्तर ईजिप्त) हे प्रमुख समाजगट येथे होत. मुख्यत: हे उघड्यावर वा तळ्यांच्या काठी कातडी तंबूंतून निवास करीत. मात्र त्यांपैकी काही गुहांतही राहत असावेत. काही भागांत जमिनीत बोगद्यासारखे खड्डे करून त्यांचा त्यांनी राहण्यासाठी उपयोग केला होता. ‘सूक्ष्मपाषण’ नावाने ओळखली जाणारी गारगोटीच्या दगडाची त्रिकोण, चंद्रकोर इ. विविध आकारांची पाती वापरून ते संयुक्त हत्यारे बनवीत. मांस व आपोआप उगवणाऱ्या धान्याचेही ते भक्षण करीत. ह्या काळात प्राणी माणसाळविण्यास आरंभ झाला असावा.

नवाश्मयुग : ह्या काळास इ.स.पू. आठ हजारांच्या पुढे आरंभ झाला. इ.स.पू. पाच हजारांच्या आसपास त्याची विशेष प्रगती झाली. त्या वेळी हवामान, प्राणी व वनस्पतिसृष्टी सध्यासारखीच होती. मानववंशही बहुधा आज असणारेच होते. बारीक दगडी पात्यांची उपकरणे, घासून गुळगुळीत व धारदार केलेल्या दगडी कुऱ्हाडी, छिन्न्या यांची निर्मिती व वापर ह्या काळात होऊ लागला. चीन व आग्नेय आशिया या भागांतील हत्यारांचे आकार भिन्न आहेत. या भागातील नवाश्मयुगीन संस्कृतीही अनेक दृष्ट्या पश्चिमेकडील तत्कालीन संस्कृतीपेक्षा भिन्न आहे. या वेळी गाय, बैल, डुक्कर,  मेंढी व शेवटी शेवटी घोडा हे प्राणी माणसाळले होते. पशुपालन  हा महत्त्वाचा व्यवसाय सुरू झाला होता. याबरोबरच धान्य पिकविण्याची विद्या मानवाला साध्य झाली असावी. या व्यवसायाचा आरंभ पॅलेस्टाइनमध्ये झाला असावा. कारण आतापर्यंत हाती आलेले याबाबतचे सर्वांत प्राचीन नवाश्मयुगीन अवशेष या भागातीलच आहेत. मानवास शेतीसाठी बराच काळपर्यंत एकाच ठिकाणी राहण्याची जरूर भासू लागली आणि त्यामुळे उपजीविकेला एक प्रकारची शाश्वती आली. म्हणून स्थिर स्वरूपाच्या वसाहतींना प्रारंभ होऊन पहिली खेडी निर्माण झाली. गवत, लाकूड, कच्च्या विटा, दगड यांनी ही घरे बांधलेली असत. काही भागांत (पूर्व आशिया) भूमिगत घरांचाही वापर होता. शेकडो वर्षांच्या वाटचालीतून ह्या स्थिरपद जीवनाचा लाभ झाला. त्या पायावरच नागरी संस्कृतीची कालांतराने उभारणी झाली. धातूंचा शोध लागल्यावर वरील प्रक्रियेला गती मिळाली आणि अश्मयुगाचा अस्तही होऊ लागला. अश्मयुगाचा अस्त प्रथम इ.स.पू. ३०००च्या सुमारास मेसोपोटेमिया व ईजिप्त या ठिकाणी झाला.

मानवी जीवन

 अन्न : मानवी जीविताच्या आद्य निकडींपैकी पहिली अन्न होय. अश्मयुगापैकी पहिल्या दोन खंडांतील मानवाचे मुख्य अन्न म्हणजे त्याच्या भोवताली वावरणारे प्राणी, थोड्याफार प्रमाणात फळेमुळे-वनस्पती. आपले भक्ष्य मिळविण्यासाठी मानवाला त्याच्या शरीरशक्तीपेक्षा बुद्धिबलाचा अधिक वापर करणे भाग होते. कारण भोवतालचे बहुतेक सर्व प्राणी त्याच्यापेक्षा ताकदवान, चपळ होते किंवा त्यांना निसर्गाकडून मिळालेली स्वरक्षणाची साधने मानवाला दूर ठेवण्यास पुरेशी होती. अशा स्थितीत माणसाने टाकलेले पहिले पाऊल म्हणजे गटागटाने शिकार करणे हे होय. अश्मयुगीन मानव ताकदीत भारी असणारा प्राणी कोंडीत पकडून त्यास दगड-धोंड्यांनी ठेचून मारी. पूर्वपुराणाश्मयुगात प्रचंड गवे व गेंडे अशा प्राण्यांना खड्ड्यात फसवून मारण्याची विद्या मानवाने हस्तगत केली होती. असे खड्डे व त्यांत फसलेल्या प्राण्यांची हाडे यूरोपात मिळाली आहेत. मात्र अग्नीचे ज्ञान झाल्यावर गुहांत विसावणाऱ्या श्वापदांना हुसकून बाहेर काढण्यासाठी त्याचा उपयोग केला जात असे. उत्तरपुराणाश्मयुगात रेनडिअर, सांबर, घोडे अशा वेगवान प्राण्यांचे कळप घेरून उंच अशा कड्याकडे वळविण्यात येत. भेदरलेली ही जनावरे धावण्याच्या वेगात कड्यावरून खाली पडत व तेथे थांबलेल्या शिकाऱ्यांच्या हातात ती अलगद सापडत. सांघिक शक्तीचे हे वेगवेगळे प्रयोग अन्नप्राप्तीच्या कामात माणसाला उपयुक्त ठरले. तद्वतच त्याची स्वत:ची संहारशक्ती नवनव्या आयुधांमुळे वाढत गेली. भाले, बोला, धनुष्यबाण इ. शस्त्रांमुळे स्वत: सुरक्षित राहूनही त्यास जास्त परिणामकारकपणे शिकार मिळवणे शक्य झाले. मच्छीमारीसाठी लहान होडगी आणि बांबूची प्रचंड टोपली यांचा उपयोग मानव आंतराश्मयुगात यूरोपमध्ये करीत होता. हाडांचे गळ, काटेरी बाण यांचाही उपयोग मासे व इतर जलचर प्राणी मारण्यास करण्यात येई.

आंतराश्मयुग व नवाश्मयुग यांच्या संधिकाळात मेंढ्या, गाई व इतर काही प्राणी माणसाळवून पाळण्याची विद्या मानवाने साधली. अशा प्राण्यांचे कळप बाळगण्यात येत व त्यांचा उपयोग प्रामुख्याने भक्षणासाठीच होत असे. पाळण्यात आलेले हे प्राणी तृणभक्षकच होते. त्यामुळे त्यांचे कळप घेऊन चराऊ कुरणांच्या शोधासाठी दूरदूर अंतरावर फिरणे त्यास आवश्यक झाले किंवा वर्षभर चारा असेल अशा ठिकाणी त्यास स्थायिक व्हावे लागले. पशुपालनाची ही अवस्था अगदी प्राथमिक असली, तरी तिची मुख्य फलनिष्पत्ती अन्नाची शाश्वती हीच होय.

याच्याच आसपास केव्हा तरी शेतीचा शोध लागला असावा. आरंभी मुद्दाम पेरण्यात आलेले धान्य म्हणजे गहू असावे. रानटी गव्हाच्या लोंब्या जमिनीवर पडतात, तेथे पुन्हा रोपे उगवतात, तेथेच नवा गहू येतो, हे जीवितचक्र माणसाच्या ध्यानात आले असावे. फळे, कंदमुळे गोळा करण्याचे काम मुख्यत: स्त्रियांकडे आले व हे निसर्गाचे चक्र प्रथम त्यांच्यात लक्षात आले असावे. कदाचित स्त्रियांनीच धान्य पेरण्यास आरंभ केला असावा. हा शेतीचा म्हणजे पर्यायाने नवाश्मयुगाचा आरंभ होय.

 शिकार, मच्छीमारी, पशुपालन व नंतर शेती हे अश्मयुगीन माणसाचे क्रमश: मुख्य व्यवसाय होते. पुराणाश्मयुगात व आंतराश्मयुगात मात्र फक्त पहिले दोनच व्यवसाय होते. नवाश्मयुगात पशुपालन व शेती हे प्रधान व्यवसाय झाले, तरीही थोड्याफार प्रमाणात शिकार व मच्छीमारी होतच राहिली. त्याच्या जीविताच्या इतर शाखांचे स्वरूप बऱ्याच अंशी त्याच्या व्यवसायांवरून निश्चित झालेले दिसते.

अश्मयुगाच्या विविध अवस्थांत मानवी अन्नाचे रूपही पालटत गेले. पुराणाश्मयुगीन व आंतराश्मयुगीन माणसाच्या अन्नात सर्व प्रकारच्या लहानमोठ्या प्राण्यांचा आणि फळे व कंदमुळे यांचा समावेश होता. मोसमात व विशिष्ट प्रदेशात सापडणारे सर्व प्रकारचे लहान-मोठे प्राणी खाद्य होते इतकेच काय, फार जरूर वाटल्यास नरमांसभक्षणही होत असे. एरवी हरणे, डुकरे, हत्ती, भीमगज, अस्वले, घोडे हे प्राणी नित्याचे भक्ष्य होते. आंतराश्मयुगात याशिवाय मासे व इतर जलचर यांचा अन्नात समावेश झाला. या युगाच्या शेवटी शेळ्या-मेंढ्या, गायी-बैल यांसारख्या पाळीव जनावरांचे मांस हा आहाराचा एक भाग झाला. नवाश्मयुगात धान्या- बरोबरच मांसाहारही चालूच राहिला.

शेती करण्यास आरंभ झाल्यावर गहू, बार्ली, मका, ज्वारी, बाजरी, राय ही धान्य व वाटाणा, घेवडा, मूग, हरभरा व मसूर यांसारखी द्विदल धान्ये स्थलकालपरत्वे पिकविण्यात येऊ लागली. तेल मिळविण्या- साठी ऑलिव्हसारख्या फळांचा वापर आग्नेय स्पेनमधे होत असे. नासपती, सफरचंद, बोरे अशांसारखी फळेही या माणसाला उपलब्ध होती. पण त्यांची मुद्दाम लागवड केलेली नसे. पाळीव जनावरांत शेळ्या, गाई व डुकरे ही मुख्य असत. यांच्या मांसाचा खाण्यासाठी उपयोग होई. लामा, उंट, घोडा ही इतर पाळीव जनावरे वेळप्रसंगी भक्षणासाठी उपयोगी पडली, तरी मुख्यत्वे त्यांचा उपयोग वाहतुकीसाठीच होत असे.

समाजरचना : अश्मयुगीन समाजरचनेविषयी उत्खननातून मिळणारा पुरावा अप्रत्यक्ष व अल्प आहे. मिळालेल्या अवशेषांवरूनच काही अनुमाने बांधावी लागतात. या अनुमानांना बळकटी आणण्यासाठी, आजच्या मानवसदृश प्राण्यांची वागणूक (गोरिला, चिंपांझी इ.) आणि आजही अत्यंत मागासलेल्या, रानटी परिस्थितीत राहणाऱ्या जमातींविषयीची माहिती यांचा उपयोग करून घ्यावा लागतो. हे सगळे करूनही अश्मयुगीन समाजव्यवस्थेसंबंधी अत्यंत त्रुटित अशीच माहिती उपलब्ध होते.

आधीच हे स्पष्ट करावयास पाहिजे, की वैचारिक देवघेवीचे मुख्य साधन जी भाषा, ती त्या कालखंडात केव्हा व कोणाकोणाला प्राप्त झाली होती, याविषयी काहीही निश्चित सांगता येत नाही. परंतु पूर्वविचार व योजना, तसेच पुरस्सर सामूहिक जीवन प्रचलित होते. त्यावरून असे काहीतरी माध्यम अस्तित्वात असावे हे नक्की. शिकार करणे हे एकट्या-दुकट्याचे काम नसून त्यासाठी सांघिक प्रयत्न जरूर होते. तेव्हा पहिल्या- पासूनच मानवाला गटात किंवा टोळीत राहावे लागले आहे. या गटास कोठल्या माणसांचा समावेश होत असावा व या गटाची रचना कशी असावी, हे प्रश्न विवाद्य आहेत. केवळ मूळ उद्देशाकडे लक्ष ठेवून विचार केला, तर कोणाही धडधाकट माणसाचा त्यात समावेश व्हावा व सगळ्यांत अनुभवी शिकाऱ्याच्या हुकमात सगळ्यांनी चालावे, ही सरळ उत्तरे आहेत. पण मानवी जीवनातील कोणताच प्रश्न इतका सरळ सुटत नाही. केवळ एखाद्या मोठ्या शिकारीला वा शिकारीच्या एखाद्या मोसमात माणसे एकत्र येण्याऐवजी काही शाश्वत असे ऐक्य आरंभापासून अधिक प्रचलित असावे व हे ऐक्य सामाजिक बंधासारखे असावे. रक्ताचे नाते असणारी माणसे एकेका गटात असावी आणि हा कौटुंबिक गट असावा. पण या वेळी ‘कुटुंब’ याचा नेमका काय अर्थ असावा, याचा उलगडा होत नाही. यात एकाच पित्याची प्रजा होती, की एकाच मातेची प्रजा होती? अश्म- युगीन स्त्रीमूर्ती व चित्रे यांवरून काही तज्ञ असा निष्कर्ष काढतात, की येथे मातृसावर्ण्य होते. अपत्यप्राप्तीतील मातेच्या कार्याची साक्षात कल्पना या समाजाला होती. परंतु इतर अनेक मागासलेल्या समाजांप्रमाणे, प्रजोत्पादनातील पुरुषाचा नेमका वाटा कोणता? याची कल्पना अश्मयुगीन समाजाला नसावी. म्हणून मातेला, म्हणजे स्त्रीला, अधिक महत्त्व असावे. या प्रश्नाची दुसरी बाजू अशी, की या समाजातील स्त्रीपुरुष- संबंधाविषयीही कसलीच माहिती उपलब्ध नाही. कदाचित आजही जे प्राणिसृष्टीत दिसते, त्याप्रमाणे त्या वेळी एक बलिष्ठ पुरुष असावा. त्याच्या चारपाच स्त्रिया व बाल्यावस्थेतील अपत्ये एवढ्यांचा कुटुंबात समावेश असणे स्वाभाविक होतो. नव्याने वयात येणाऱ्या स्त्रीपुरुषांना–विशेषत: पुरुषांना –या व्यवस्थेत सामावून घेणे हा नेहमीचा प्रश्न राहणार. मग हे तरुण, आपल्या अथवा शेजारच्या कुटुंबातील स्त्रियांना वश करून घेऊन, स्वतंत्र कुटुंबे स्थापतील. म्हणजे पितृ-किंवा मातृ-सावर्ण्य यांपैकी कोणतीही पद्धत प्रचलित असू शकेल. अशी कुटुंबे एकत्र येऊन त्यांचा पुढे गट निर्माण होत असे. व्यावहारिक गरज व स्त्रीपुरुषसंबंध या दोन्हींची अशी सांगड घातली जात असणे सुसंगत व संभाव्य ठरते. या एकेका गटाचे सर्व घटक तेथे असतीलच असे म्हणवत नाही. तथापि एखाद्या विशिष्ट प्रदेशात राहणारी काही कुटुंबे व्यावहारिक सोयींसाठी एकत्र गट करीत असतील. या गटाचे निष्ठास्थान रक्तसंबंध नसल्याने काही दृश्य चिन्ह असणे उपकारक ठरेल, म्हणून एखाद्या प्राण्याचा किंवा पक्ष्याचा, निशाणी वा गणचिन्ह म्हणून उपयोग होऊ लागला. गुहांच्या भिंतींवर अस्वले, गेंडे अशा प्राण्यांची जी चित्रे दिसतात ती गणचिन्हेच समजता येतील. अशा गटात तीसपासून साठापर्यंत माणसे असावीत. ही सगळी एकत्र राहत, तसेच त्यांचे खाणेपिणेही एकत्रच होत असे. शिकारीसाठी म्हणून एखादा विशिष्ट भूप्रदेश एकेका गटाने राखून ठेवलेला असण्याची शक्यता असावी. 

  गटातील माणसे कोणती कामे करीत होती, याचे अगदी स्थूलमानाने विवेचन करता येईल. शिकार हा प्रमुख व्यवसाय पुरुषमंडळी करीत, तर फळे, मुळे, कंद हे गोळा करण्याचे काम स्त्रिया व मुले यांजकडे असे. मांस भाजून खाण्यास आरंभ झाल्यावर तेही स्त्रियांचेचे काम झाले असावे. स्त्रीचे सगळ्यात महत्त्वाचे कार्य बालसंगोपन हे होय. मानवी अपत्य दोनतीन वर्ष पूर्णपणे परावलंबी असते हे ध्यानात घेतले म्हणजे बाल- संगोपनात स्त्रीला लागणाऱ्या वेळाची व श्रमाची सार्थ कल्पना येईल. दगडी हत्यारे व उपकरणे तयार करणे हे काम पुरुषांचे होते. पंचमहाभूते, वृक्ष, स्थलदेवता, मृतात्मे यांसारख्या अतिमानुषी शक्तींवर ताबा चालविणाऱ्या पुरोहिताचा व्यवसाय गटाचा नायक किंवा वयोवृद्ध स्त्री वा पुरुष यांपैकी कोणीही करीत असे.

उत्तरपुराणयुगातील व आंतराश्मयुगातील गुहांच्या भिंतींवरील चित्रे, त्यांत सापडणाऱ्या स्त्रीमूर्ती, हाडे व शिगें यांवरील कोरीवकाम, अशा कलावस्तूंची निर्मिती हा या कालखंडात प्रचलित झालेला आणखी एक व्यवसाय होय. यांतील बरीच चित्रे व मूर्ती धार्मिक विधींशी निगडित होत्या. तेव्हा त्यांची निर्मिती करणारी माणसे अर्थातच समाजाने पोसलेली असावीत, असे दिसते. याच काळात हत्यारांसाठी गारगोटीसारखे दगड वापरू लागले. हे दगड निरनिराळ्या गटांना पुरविणे हाही एक स्वतंत्र व्यवसाय उदयास आला असावा. उत्तरपुराणाश्मयुगीन व आंतराश्मयुगीन हत्यारे आकाराने लहान पण वैविध्यपूर्ण होती. ती तयार करण्यास विशेष कौशल्याची आवश्यकता असल्याने अशा कारागिरांना साहजिकच गटात स्वतंत्र स्थान व महत्त्व प्राप्त झाले असावे.

एकीकडे रक्तसंबंध आणि व्यावहारिक गरज यांमुळे निर्माण होणारे ऐक्य, दुसरीकडे स्त्रीपुरुषसंबंधातून उत्पन्न होणारे व व्यवसायप्रावीण्यापोटी उद्भवलेले ताण, यांच्या संघर्षातून समाजगट टिकविण्याची व्यवस्था काय असावी? या संदर्भात व्यवहारचातुर्य व औदार्य यांच्या जोडीला दंडशक्तीचीही गरज असली पाहिजे. ह्या दंडशक्तीचा वापर करण्याचे काम पुरोहिताकडे असावे. अतिमानुषी शक्तीवरील श्रद्धेचा उपयोग सामाजिक ऐक्य टिकविण्यास होत असे. याला परंपरा व रूढी यांचा चांगलाच आधार मिळत असावा.

नवाश्मयुगात उपजीविकेच्या साधनांत मूलभूत क्रांती घडून आली. पशुपालन अथवा शेती यांमार्गे होणारी अन्नप्राप्ती आणि शिकारीतून होणारी प्राप्ती यांत एक फार महत्त्वाचा फरक आहे. या भेदाचे परिणाम दूरगामी ठरले. शिकार मिळविण्यास फार तर एकदोन किंवा तीनचार दिवस जात, परंतु एकदा मेलेला प्राणी हाताशी आला, की लगेच खाता येई शिकार करणे हे काम सतत चालू असले, तरी त्यातून फलप्राप्ती जवळजवळ तत्काळ होत असे. आता मेंढ्या वा गुरांचे कळप बाळगावयाचे म्हणजे, गुरे वाढवावयास हवीत. शेतात धान्य पेरल्यानंतर प्रत्यक्ष धान्य हाती येईपर्यंत तीन ते सहा महिने इतका काळ वाट पाहत बसावयास पाहिजे. तसेच धान्य पेरण्याच्या आधी त्या जमिनीची मशागत केली पाहिजे. माणसाचे अवधान सतत त्याच गुरांच्या कळपावर पाहिजे, त्याच जमिनीच्या तुकड्यावर पाहिजे. यामुळे अधिकाधिक आपुलकी निर्माण झाली व तिचेच रूपांतर स्वामित्वाच्या भावनेत झाले. याचीच दुसरी बाजू अशी, की कळपातील गुरांपासून अन्न मिळणार ते त्यांची जोपासना करणाऱ्याला–दुसऱ्याला नव्हे. म्हणजे उपजीविकेच्या साधनांवर मालकी हक्काचा उदय झाला. आरंभी ही मालकी प्रत्येक गटाची सामूहिक होती. नंतर कुटुंब हा महत्त्वाचा दुवा झाला आणि शेवटी तेथे व्यक्ती आली. एकेका व्यकीच्या मालकीचे कळप किंवा शेतजमीन या वेळी नव्हती पण एकेका कुटुंबाच्या सर्वस्वी मालकीची स्थापना मात्र झालेली दिसते. याचे साधे कारण असे, की कोणाही व्यक्तीला अधिकार आणि कर्तव्य यांची सर्वांत फायदेशीर जोड कुटुंब या समूहाद्वारेच मिळण्यासारखी होती. जमिनी वर्षानुवर्षे टिकवून धरावयाच्या याचाच अर्थ वारसा म्हणून त्या मिळावयाच्या, तर तो अधिकार कोणाचा हे स्पष्ट करणे म्हणजे कुटुंब या संस्थेचे रूप नक्की ठरणे आवश्यक होते. नवाश्मयुगाच्या आरंभीच्या काळात पितृसावर्ण्य रूढ झाले. आता पुराणाश्मयुग व आंतराश्मयुग यांतल्यासारखी स्थिती राहिली नाही. या कालखंडातील माणसाला एकाच ठिकाणी स्थायिक होणे अत्यावश्यक झाले. केवळ पशुपालन व मेंढपाळी करणाऱ्या लोकांना चराऊ कुरणाच्या शोधार्थ थोडीशी भ्रमंती करावी लागत असली, तरी पशुपालन व शेती असे दोन्ही व्यवसाय करणारे लोक कायमचे एकत्र राहू लागले.

दगडाची हत्यारे करणे, त्याला आवश्यक ते दगडाचे प्रकार मिळविणे, थोड्याफार प्रमाणात शिकार करणे, तसेच पौरोहित्य, कलाकृती हे सर्व व्यवसाय पूर्वीप्रमाणेच आताही चालू राहिले. मात्र शेतकी आणि पशुपालन यांसंबंधीची तंत्रे अंगी आणणे जरुरीचे झाले. हेच सर्वसाधारण व्यवसाय असल्याने बहुतेक स्त्रीपुरुष यांत तरबेज झाले. आता नवीन व्यवसाय आले. घरे बांधणे, त्यासाठी सुतारकाम-गवंडीकाम आले वस्त्रे विणणे आणि नवाश्मयुगाच्या उत्तरार्धात मृत्पात्रे तयार करणे ह्याही गोष्टी आल्या. यांतील वेतकाम, बुरूडकाम यांसारखे काही पूर्वापार व्यवसाय होते. त्यांत  वस्त्रे विणणे याची भर पडली. मृत्पात्रे तयार करणे, ती रंगविणे हे व्यवसाय स्त्रियाही करीत. सर्व लोक निरनिराळे व्यवसाय करीत होते. पण निरनिराळ्या उत्पादनांची गुणवत्ता पाहिल्यानंतर असे वाटते, की प्रावीण्य मिळविलेल्या माणसांचेच हे काम असले पाहिजे. म्हणजे व्यवसाय व त्यातील प्रावीण्य यांच्या अनुषंगाने समाजाची व्यावसायिक विभागणी झाली होती. असे कुशल कारागीर एकाच गावात राहत की इतर गावांत काम करीत, हे ज्ञात नाही. परंतु व्यावहारिक सोयीच्या दृष्टीने पाहिल्यास ते फिरते असण्याचा अधिक संभव वाटतो. फिरत्या कारागिरांच्या पाठोपाठ फिरते व्यापारीही आले असावेत. इतकी कुटुंबे कायमची एकत्र राहू लागली. गुरेढोरे, शेतजमिनी यांवर कौटुंबिक (खाजगी) मालकी निर्माण झाली. तंत्रज्ञांमुळे काही व्यवसायांवर एखाद्या कुटुंबाची वा माणसाची मक्तेदारी आली. म्हणजे साहजिकच संघर्ष-प्रसंगांची शक्यता वाढली. आतापर्यंत सामाजिक संघर्षाला पोषक असे घटक अश्मयुगीन समाजात नव्हते. अतिमानुषी शक्तीवर श्रद्धा, मृतात्मे, पुरोहित, वडीलधारी माणसे, परंपरा यांचे समाजावर नियंत्रण होतेच. परंतु आता दंडनीती आणि शासनसंख्या अत्यावश्यक झाली. याच संस्थेकडे समाजाचे व त्याच्या मालमत्तेचे बाह्यशत्रूकडून रक्षण करण्याचे दायित्वही आपोआप आले. अशी संस्था कोणत्याही स्वरूपाची असेल त्यावर वडिलधाऱ्या मंडळीची सभा, एक वयोवृद्ध वा अनुभवी पुढारी-धर्मगुरू (पुरोहित) प्रमुख म्हणून असावा.

  शेवटी नवाश्मयुगीन समाज शाश्वत पायावर उभा राहून समाजरचनेत महत्त्वाचे बदल घडले आणि कुटुंब ही संस्था श्रेष्ठ ठरली. यातून नियंत्रणाची गरज निर्माण होऊन शासनसंस्थाही याच काळात उत्पन्न झाली असावी. तिचा आवाका लहान असला, तरी मूलभूत लक्षणे तेथून दृग्गोचर होऊ लागतात. या समाजा- च्या तंत्रज्ञानाविषयी बरीच माहिती उपलब्ध झाली आहे.

वसतिस्थाने : अश्मयुगीन वसाहतींचे स्वरूपही वैविध्यपूर्ण होते. वसाहतींचा विचार करण्यापूर्वी फुटकळ निवासस्थानेच आधी पाहावयास पाहिजेत. निवासस्थानांचे स्वरूप तत्कालीन हवामानावर अवलंबून होते. त्यानुसार सामान्यपणे निवासांचे दोन प्रकार दिसतात. गुंफा वा प्रस्तरालय यांसारखी नैसर्गिक आणि झोपड्या किंवा तंबू यांसारखी कृत्रिम आवरणे निवासासाठी वापरीत. पुराणाश्मयुगातील पहिल्या दोन भागांत हवेतील तपमानाचे चढउतार तीव्र असल्याने, विशेषत: हिवाळा फारच कडक असल्याने, मानवाने गुंफांचा वा थोड्या पुढे झुकणाऱ्या कडेकपाऱ्यांचा आश्रय सर्वत्र केलेला होता. सर्व प्राचीन ज्ञात अशा गुहा चीनच्या जोकोत्येन (Chou-kou-tien) भागातच आढळल्या आहेत. त्यानंतरच्या गुहा यूरोपमधे दक्षिण फ्रान्स व उत्तर स्पेन, आशियात पॅलेस्टाइन व सिरिया आणि आफ्रिकेतील मोरोक्को येथे आढळतात. अल्जिरियाच्या भूमध्य सागरा- नजीकच्या प्रदेशात मध्याश्मयुगातील वस्त्यांचे अवशेष मिळाले आहेत. यांतील काही गुंफांत उत्तरपुराणाश्म- युगात वस्ती झाली, तर काहींत आंतराश्मयुगातही वस्ती होती. भारतातील मध्य प्रदेशातील गुहा आंतराश्म- युगीन आहेत, तर अमेरिकेतील गुहा सांस्कृतिक दृष्ट्या अश्मयुगाच्या विविध टप्प्यांतील आहेत. तरीसुद्धा त्या कालदृष्ट्या नजीकच्या आहेत. पण सर्व गुहांतील किंवा प्रस्तरालयांतील निवासांत काही समान विशेष दिसतात. निवासाला गुहा वा कपाऱ्या निवडताना त्यांची तोंडे वाऱ्याच्या दिशेला येणार नाहीत अशी काळजी घेतली जात असे. गुहांच्या तोंडाशी काही आडोसे असलेच, तरी त्यांविषयी विशेष माहिती मिळत नाही. गुहा बरीच खोल असेल, तर मुखाच्या भागातच वस्ती होई. तथापि फार खोलातली जागा टाळलेली दिसते. या आतल्या भागाचा चित्रकामाला वा काही पूजाअर्चा यांसारख्या विधींना उपयोग होत असावा. त्यांना ‘मंदिरे’ किंवा ‘पूजास्थाने’ अशीही नावे यामुळे दिली जातात. अत्यंत कडाक्याच्या हिवाळ्याला उतार पडल्याबरोबर तळी, नद्या यांच्या काठी माणसे उघड्यावरही राहत असतील, अशा काही ठिकाणी त्यांच्या अस्तित्वाचा निर्णायक पुरावा ⇨ ओल्हुवायी गॉर्ज (आफ्रिका) येथे मिळाला आहे. तेथे त्यांनी काही झोपड्या वा घरे बांधली. याविषयीच्या खाणाखुणांचा मात्र काहीच मागमूस आज लागत नाही. माणसाने उभारलेल्या आसऱ्या- चे स्पष्ट अवशेष उत्तरपुराणाश्मयुगातच प्रथम मिळतात. तेही एका विशिष्ट भागातच आणि एका विशिष्ट समाजगटाशी निगडित आहेत. आग्नेय यूरोपात चेकोस्लोव्हाकियात व्हिस्टोनीस, ऑस्ट्रोव्हा व पेट्रोव्हिज दक्षिण रशियात डॉन नदीवरील गागारिनो येथे व सायबेरियात टिमोनोव्हका येथे हे अवशेष मिळतात. पहिल्या दोघांचा संबंध ग्रेव्हॅटियन लोकांशी आहे आणि भीमगज या अजस्र प्राण्याची शिकार हाच त्यांचा मुख्य व्यवसाय असल्याने या लोकांना त्याच्या पाठोपाठ विरळ जंगलात येऊन राहणे भाग पडले. स्वाभाविकच त्यांनी काही आश्रयस्थाने बांधली. यांना घरे म्हणण्यापेक्षा तंबू वा झोपड्या म्हणणे अधिक सोयीचे ठरेल. वर्तुळाकार वा लंबवर्तुळाकार अशा रचनेच्या या झोपड्या आकाराने पुष्कळच मोठ्या असत (उदा., व्हिस्टोनीस : १५ मी. लांब व ९ मी. रुंद). यांवर झाडाच्या फांद्या तिरप्या एकमेकांना टेकून त्यांवर पाला, गवत वा कातडे पसरण्यात येत असे. जेथे सबंध छप्पर कातडी एकमेकांना जोडून तंबूसारखे करीत, तेथे ताण देण्यासाठी मोठाले घोडे वा भीमगजाचे सुळे त्यांच्या कडेवर ठेवलेले दिसतात. छप्पर जमिनीवरच टेकत असल्याने भिंतीची गरजच नव्हती. परंतु एखाद्या ठिकाणी, विशेषतः जमीन उतरती असल्यास, दगडामातीची लहानशी भिंतही बांधण्याची विद्या त्यांना ज्ञात होती (व्हिस्टोनीस). भोवतालच्या जमिनीपेक्षा घराची जमीन खोलगट असे. जमिनीवर सपाट दगड अंथरून क्वचित फरशीही केलेली दिसते. मध्यभागी ओळीने चुलखंडे घातलेली असत– एका झोपडीत अशी पाच चुलखंडे आहेत. परिघानजीक खळगे करून साठवणाची व्यवस्था होई. टिमोनोव्हका (सायबेरिया) येथे उत्तरपुराणाश्मयुगात प्रचारात असलेल्या दुसऱ्या एका प्रकारच्या घरांचे अवशेष मिळाले आहेत. ही घरे कडाक्याच्या थंडीपासून बचाव करण्यासाठीच तयार केलेली असावीत, यात शंका नाही. यांना कृत्रिम गुंफा म्हटले तरी चालेल. त्यांच्या रचनेसाठी जमिनीत तीन मी. किंवा अधिकही खोल असा गोल खड्डा करण्यात येई. याचा व्यासही तेवढाच आहे. आत जाण्यासाठी जिना असे. वरच्या बाजूने मोठाली लाकडी आडवाटे वा बांबू टाकून त्यावर गवत, पाला व चिखल थापून छप्पर तयार करीत. साधारणपणे जिन्यानजीक किंवा झोपडीच्या (खड्ड्याच्या) बाहेर उघड्यावर चुली पेटविण्यात येत. चीनमधील शान्सी प्रांतात तसेच भारतात काश्मीरमध्ये  ⇨ बुर्झाहोम  येथे अशा प्रकारची घरे सापडली आहेत. मात्र दोन्ही ठिकाणी ती नवाश्मयुगातीलच आहेत. परंपरेच्या सातत्याची कल्पना देण्यासाठी त्यांचा येथे उल्लेख केला आहे. आंतराश्मयुगीन निवासांची सर्व माहिती बव्हंशी यूरोपातूनच मिळालेली आहे. पुराणाश्म- युगाच्या मानाने हवामान बरेच उष्ण असल्याने गुहांतून वा प्रस्तरालयांतून राहण्याची किंवा खड्ड्यासारख्या घरांतून राहण्याची आता जरूर नव्हती. त्यामुळे वर्षभर उघड्या मैदानावर आता राहता येऊ लागले. स्वाभाविकच घर बांधण्याची विद्या आता प्रगत झाली. या प्रगतीला मुख्य हातभार कशाचा लागला असेल, तर तो माणसाच्या जीविताला लाभलेल्या स्थैर्याचा. विशेषतः नद्यांच्या वा तलावांच्या आसपास बारमास मासळी मिळू लागली. तेव्हा येथे राहणे आवश्यक झाले. या वेळेपर्यंत जंगलाची वाढही झालेली होती व लाकडाचा सफाईने उपयोग करता येऊ लागला. परिणामी जास्त टिकाऊ व प्रशस्त घरे या काळात रूढ झाली. घर बांधण्यासाठी वाळवंटी (कोरडी) किंवा थोड्या उंचवट्यावरची जमीन निवडण्यात येऊ लागली. कोरडी जमीन मिळाली नाही, तर तीवर फांद्या, पालापाचोळा, झाडाच्या साली अंथरीत (जर्मनी–लूबेक इंग्लंड–स्टारकार) व त्यावर माती पसरून कोरड्या जमिनी तयार करीत. घरे सामान्यतः गोल व लंबगोल आराखड्याची असत. लाकडी (फांद्यांच्या) भिंती व तशीच छपरे असत. क्वचित कातडी छप्परही असे. घर उभे करताना कोठे कोठे दगडांचा वापरही केला आहे. आतापर्यंतच्या काळात सहसा न आढळणारी एक गोष्ट आता दिसू लागते ती म्हणजे घरांचे समूह. इंग्लंडमध्ये सरे परगण्यात किंवा डेन्मार्क-हॉलंडमध्ये असे समूह अनेक ठिकाणी आढळतात. मात्र ही सगळी घरे एकाच वेळी वापरात होती का पुन्हापुन्हा नव्याने बांधीत याविषयी  निश्चित माहिती नाही. कारण गृहसमूहांना आनुषंगिक अशा रस्ते किंवा सरंक्षणयोजना कोठेच दिसत नाहीत. त्या पुढे आल्या.

 जीविताच्या इतर शाखांप्रमाणे याही क्षेत्रात नवाश्मयुगात क्रांतिकारक बदल झालेले दिसतात. नव्या जीवनपद्धतीत स्थिर वस्ती ही समाजाची गरज झाल्याने जास्त टिकाऊ निवासस्थाने आवश्यक झाली. स्वाभाविकच चिवट व बळकट सामान कौशल्याने वापरण्यात येऊ लागले. लव्हाळे, बांबू, कातडी यांच्या ऐवजी आता मोठाले लाकडी ओंडके, दगड, कच्च्या विटा यांचा उपयोग होऊ लागला. नवाश्मयुगीन निवासस्थानांत स्थलकालपरत्वे खूपच वैविध्य आढळते. घरांचा आराखडा आता गोल, चौरस वा आयत अशा आकारांचा झाला. मध्याश्मयुगातही भिंत हा घटक फारसा कोठे आढळत नाही. आता बांबूच्या-वेताच्या तट्ट्यापासून, दगड, कच्च्या विटा यांच्या बांधलेल्या अशा सगळ्या प्रकारच्या भिंती दिसून येतात. या भिंतींवर गिलावा करून त्यावर रंगकामही केलेले आढळते (जार्मो). भिंती भक्कम करण्यासाठी त्यांखाली दगडी जोती ठेवण्याच्या प्रथेचाही आरंभ झालेला दिसतो (जार्मो). भोवतालच्या जमिनीपेक्षा घराची जमीन थोडीशी खोलगट करण्याची प्रथा आताही बऱ्याच भागांत चालूच राहिली. छपराचे स्वरूप मुख्यत्वे बांधकामाची साहित्यपद्धती व पर्जन्यमान यांवरच अवलंबून राहिले. पावसाळी भागात लाकडी उतरती वा दगड-विटा यांची घुमटाकार व इतरत्र सपाट अशी छपरे इमारतींवर असत. ⇨जेरिको  (पॅलेस्टाइन), खिरोकिटिया (सायप्रस), हसौना (उ. मेसोपोटेमिया) हे अवशेषांचे त्याबाबतचे नमुने होते. कालांतराने घरांमध्ये एकच दालन ठेवण्याऐवजी त्याच्या खोल्या पाडण्यात येऊ लागल्या. सायप्रसमधील खिरोकिटिया येथील वर्तुळाकार घरात पोटमाळा काढलेला होता. त्याला पक्क्या खांबांचा आधार होता, तरीही जिना मात्र पक्का नव्हता. तेथे साध्या शिडीचाच उपयोग केलेला असावा. उपलब्ध जागेच्या विभाजनाचा हा एक स्वतंत्र व फारसा रूढ न झालेला प्रकार. खोल्यांची कल्पना रुजल्यावर कित्येक ठिकाणी समोर ओवरी, त्यामागे एकापाठोपाठ एक अशा दोन खोल्या, अशीच मांडणी हलाफ (सिरिया) येथील अवशेषांवरून दिसते. यापुढे हसौना येथे एका उघड्या चौकाभोवती अनेक खोल्या मांडलेल्या दिसतात. सर्व खोल्यांना हवा व उजेड पोचण्यास ही योजना उपयुक्त होती, तसेच सगळ्यांभोवती एक मोठी भिंत असल्याने सगळे घर सुरक्षित राही. आर्पाकिया (उत्तर इराक) या ठिकाणी घरांची थोडी निराळी रचना सापडते. वर्तुळाकार रचनेचीच ही थोडी सुधारलेली आवृत्ती असावी. या घराचे दोन भाग दिसतात. एक वर्तुळाकार दालन व त्याच्या समोर आयता- कार दालन दिसते. या दालनाला प्रवेशद्वार असावयाचे. पण हा आराखडा अपवादात्मक होय. एरवी गृह-

रचनेच्या विद्येतील सर्व मूलभूत घटक–वास्तुसाहित्य, वास्तुरचना, तंत्र, वास्तुविधान व सुशोभन–नवाश्म- युगीनांनी आत्मसात केलेले दिसते. वास्तुविद्येची ही सर्व प्रगती मुख्यत्वे पॅलेस्टाइन, तुर्कस्तान, इराक या भागांत व भूमध्य समुद्रातील काही बेटांत झाली, हे ध्यानात घ्यावयास हवे. कारण साधारणत: याच भागात नवाश्मयुगीन संक्रमण सिद्धीस पोचले असावे, असे समजतात.

यूरोप, चीन, भारत व ईजिप्त या ठिकाणी नवाश्मयुगीनांनी बांधलेली घरे बरीचशी निराळी आहेत. यूरोप- मध्ये गृहरचनेस लाकडाचाच उपयोग होत गेला. आयताकार वा चौरस घरे भक्कम लाकडी किंवा बांबूच्या सांगाड्याभोवती बांधीत. भिंती आणि बहुधा छपरेही फळ्यांची केलेली असत. क्वचित त्यांवर गवत पसरीत (फेडर्झे, कोलोन-लिंडन्थॉल), ईजिप्तमध्ये ⇨ फायूम  येथे बांबू व तट्ट्या यांच्या झोपड्या वापरीत असावेत असे दिसते. यानंतरच्या मेरिम्डीयन समाजाने अशा झोपड्यांची छपरे घुमटाकार बनवून त्यांवर चिखल थापण्यास आरंभ केला. चीन व भारत या दोन्ही ठिकाणी सामान्यपणे लाकूड व गवत यांच्या वर्तुळाकार वा चौकोनी झोपड्या वापरलेल्या दिसतात (टेक्कलकोटा). क्वचित प्रस्तरालयाचाही आश्रय केलेला होता. परंतु चीनच्या शान्सी व भारताच्या काश्मीर भागात खड्ड्यांत केलेली घरे या काळात वापरीत.

आंतराश्मयुगात काही ठिकाणी पाचसात घरांचे समूह दिसले, तरी त्या वेळी ग्राम या कल्पनेचा जन्म झाला नव्हता. नवाश्मयुगात बरीच माणसे कायमची एका ठिकाणी राहणार, म्हणजे बरीच घरे एकमेकांशेजारी बांधली जाणार, असे झाल्यावर या सहवासाचा अर्थ व त्यातील प्रश्न समजावयास लागले. या माणसांना ये-जा करण्यास मार्ग हवेत, म्हणजे रस्ते हवेत. नवाश्मयुगातील बर्‍याच मोठ्या कालखंडात रस्ता ही कल्पना ज्ञात नव्हती. दोन घरांच्या मध्ये उरणाऱ्या जागेतूनच दळणवळण चाले. हे सोयीचे करण्याचे प्रयत्न क्वचित काही ठिकाणी झालेले दिसतात. आर्पाकिया येथे अशा वाटांवर दगड अंथरले होते, तर खिरोकिटिया येथे मुख्य रस्त्यावर फरसबंदी केलेली होती. परंतु ही उदाहरणे अपवादात्मक होत. यूरोपातील काही वसाहतींत (फेडर्झे) घरे एका ओळीत बांधून मध्यभागी हेतुत: रस्ते ठेवलेले दिसतात. इतरत्र अशी योजनापूर्वक मांडणी सापडत नाही. वाहने नसल्याने खेड्यांना एकमेकांशी जोडणारे रस्ते निर्माण होण्याची शक्यताच नव्हती. खेड्यांच्या रक्षणासाठी काही बांधकाम करण्याची व्यवस्था नवाश्मयुगात प्रथम झाली. इ.स.पू. आठव्या सहस्रकात जेरिको येथे एक प्रचंड दगडी तटबंदी उभारण्यात आली होती. पण हेही एकुलते एकच उदाहरण आहे. नवाश्मयुगाच्या अगदी शेवटी शेवटी भूमध्य सागराभोवतालचा प्रदेश व पश्चिम आशिया या भागांतील काही ठिकाणी विटांच्या तटबंद्या बांधण्यात आल्या (मर्सीनू, हसितकार, ट्रॉय). उत्तर व मध्य यूरोपातील वसाहतींभोवती लाकडी तटबंद्या व खंदक आढळले आहेत (कोलोन-लिंडन्थॉल). फ्रान्समध्ये काही टेकड्यांच्या माथ्याभोवती असणाऱ्या दगडी भिंती याच काळातील समजतात. ही सर्व उदाहरणे फुटकळ आणि काळ व स्थळ या दोन्ही दृष्टींनी एकमेकांपासून दूरची आहेत. म्हणून ग्राम अस्तित्वात आले, तरी ग्राम-योजना व ग्राम-संरक्षण या कल्पनांचे आकलन झाले होते किंवा त्या रुजल्या होत्या, असे निश्चितपणे म्हणता येत नाही.

दळणवळणासाठी वाहने वापरली जात असल्याची शक्यता असली, तरी प्रत्यक्षात वाहने होती किंवा कसे आणि असल्यास त्यांचे स्वरूप काय असावे, हे सांगता येत नाही. प्राणी माणसाळविलेले असल्याने ओझे लादून नेण्यास वा बसून जाण्यास उपयोगी होत असावेत. उत्तरपुराणाश्मयुगात होड्या करता येऊ लागल्या होत्या. नदीत अगदी थोड्या अंतरावर जाऊन मच्छीमारीसाठी त्यांचा वापर होई. नवाश्मयुगात होड्या होत्याच. त्यांचा आकार थोडा वाढला होता. या काळाच्या शेवटी कदाचित शिडीही वापरण्याची विद्या मानवाला साध्य झाली असावी. मात्र ही प्रगती पूर्णपणे स्थानिक होती. ती नाईल नदीवरील प्रवासापुरतीच मर्यादित होती.

हत्यारे व आयुधे: आपल्या अंगातील नैसर्गिक शक्तीला भोवतालच्या पदार्थांची जोड देऊन स्वत:ला अधिक कार्यक्षम बनविणे हा कोणत्याही मानवी तंत्रज्ञानाचा प्राथमिक उद्देश असतो. अश्मयुगात मानवाने लाकडे, हाडे व मुख्यत: दगड यांचे साहाय्य घेतले. त्यापासून आपल्या उपयोगी पडतील अशी उपकरणे व आयुधे घडविण्यास त्याने आरंभ केला. किंबहुना उपकरणे व आयुधे वापरण्याची बुद्धी व ती तयार करण्याची शक्ती ही मानवाची व्यवच्छेदक लक्षणे समजावी लागतात. अश्मयुगातील तंत्रविषयक प्रगतीच्या दिशा पुढीलप्रमाणे होत : एखाद्या विशिष्ट कामाला विशिष्ट आकाराचीच उपलब्ध वस्तू (दगड) जास्त उपयोगी पडते ही जाणीव त्यास झाली. ही जाणीव एकाएकी प्राप्त न होता अनुभवातूनच उत्पन्न होते. त्यामुळे विशिष्ट आकाराच्याच दगडांची निवड करून, हव्या त्या आकारांचे दगड न मिळाल्यास, जे दगड हाताशी असतील त्यांना मनाजोगता आकार देण्यास त्याने सुरुवात केली.यासाठी दगडाचे टवके व तुकडे उडविणे व योग्य आकार देणे त्यास क्रमप्राप्तच होते. पूर्णपुराणाश्मयुगाच्या आरंभापासूनच येथपर्यंत त्याने मजल मारलेली दिसते.दगडाचा आकार जसा निवडता आला, तसाच त्याचा प्रकारही मानव निवडू लागला.ठिसूळ

 दगडांचे आडवे कातळ निघू शकतात, हेही ज्ञान त्यास होऊ लागले. त्याचप्रमाणे तो उपकरण-प्रकाराला जास्त अनुकूल असा दगडाचा प्रकारच निवडू लागला. पुराणाश्मयुगाच्या मध्य व उत्तर खंडांत त्यास अशी पारख पूर्णत्वाने प्राप्त झालेली दिसेत. लहान आकाराचे छिलके व पाती यांसाठी चर्ट (Chert), ॲगेट (Agate) असे अत्यंत घट्ट व एकसंध पाषाणप्रकार त्याने निवडलेले दिसतात. निवडलेल्या पाषाणप्रकारांतून अपेक्षित आकार घडविण्याच्या पद्धतींत पुढे वैविध्य आले व प्रगती झाली. बदामी आकारचे व बहुविध उद्योगांचे ‘हातकुऱ्हाड’ नावाचे हत्यार तयार करण्याच्या दोन पद्धतींवरून हा मुद्दा जास्त स्पष्ट होईल. अबेव्हिलियन पद्धतीत दगडाचे मोठाले टवके उडवीत, त्यामुळे आयुध ओबडधोबडच राहत असे. अश्यूलियन पद्धतीत टवके उडवून हलकेहलके इष्ट आकार घडवीत. त्यामुळे सलग व धारदार अशी कड व अणकुचीदार टोक तयार होई. केवळ दगडाचे आयुध वापरण्याऐवजी त्याला लाकडी किंवा हाडाच्या दांड्याची जोड द्यावी, हे ज्ञान त्यास होऊ लागले. दगडी हत्यार काठीला वा हाडाला बांधून दांड्यात भोक पाडून त्यात दगड, किंवा दगडात भोक पाडून त्यात दांडा, तो अडकवू लागला. दांड्याला खाचा पाडून त्यात तो दगड बसवू लागला. त्यामुळे कुऱ्हाडी, विळे, बाण असे संयुक्त आयुध बनू लागले. उत्तरपुराणाश्मयुगापासून पुढे संयुक्त आयुधे विशेष प्रचलित झालेली दिसतात. यासाठी दगडाच्या लहान आकाराच्या छिलक्या व पाती तयार करण्यास या वेळेपासूनच प्रारंभ झाला होता. आंतर व नव या दोन अश्मयुगांत या छोट्या पात्यांचा उपयोग करून हरतऱ्हेची संयुक्त आयुधे बनविण्यात मानवास प्रावीण्य प्राप्त झाले. बाण, सुऱ्या, विळे, खुरपी अशी अनेकविध उपकरणे आता तयार झाली. लहानलहान भाग एकत्र आणून आयुध तयार करण्याची ही पद्धती पूर्वीच्यापेक्षा अधिक वेळ खाणारी व विशेष कौशल्याची होती. परंतु यामुळे उत्पन्न झालेली आयुधे विविध प्रकारची तर होतीच, पण कार्यक्षमही होती. उपकरणे वा आयुधे यांच्या निर्मितितंत्राची उत्क्रांती विचारपूर्वक किंवा पूर्व-

योजनेप्रमाणे झाली नाही. गरजा, उपलब्ध सामग्री आणि परंपरागत ज्ञान यांच्या समन्वयातून ती होत गेली. उदा.,  पुराणाश्मयुगात मुख्यत: घातक आयुधे तयार झाली, तर नवाश्मयुगात शेतकी व्यवसायाला उपयोगी अशी विळा, खणण्याची काठी ही अवजारे तयार होत होती. क्षेपणायुधांत भाला, भालाफेकीची काठी, बोला, धनुष्यबाण व गोफण ही सर्व प्राणघातक आयुधे होती. मुख्यत: शिकारीसाठी वापरण्यात येणारे आयुध म्हणजे भाला. टोकदार काठी हेच भाल्याचे पहिले रूप होय. टोक भाजून, टणक करून, टोकाला दगडी फाळ लावून ते केलेले असे. हे भाले जास्त दूरवर फेकता यावेत म्हणून त्यांच्या एका टोकाला उंचवटा असणारी काठी उत्तरपुराणाश्मयुगात काही ठिकाणी वापरात आली. तीनचार कातडी वाद्यांच्या टोकांना गोल गोटे बसवून त्यांची दुसरी टोके एकत्र बांधलेले आयुध म्हणजे ‘बोला’. आपल्या डोक्यावर ते गरगर फिरवून जोराने भिरकावून दिले, की चक्रासारख्या फिरणाऱ्या या गोट्यांच्या तडाख्यात एखादा मोठा पक्षी सापडे किंवा त्यात श्वापदाचे पाय गुंतून ते हाती लागे. धनुष्यबाणाच्या उपयोगास आंतराश्मयुगापासून आरंभ झाला असावा. धनुष्याला कातडी वादी लावीत. बाणाला दगडाची किंवा हाडांची टोके बसवीत. गोफण हे एक प्रभावी क्षेपणायुध नवाश्मयुगात गवसले.  त्यास दगड नसले तर मातीचे भाजून पक्के केलेले गोळे वापरीत असत. लाकडे व हाडे यांचा स्वतंत्र उपकरणांच्या निर्मितीसाठीही उपयोग केलेला आढळतो. लाकडाची हत्यारे कालौघात बव्हंशी नष्ट झाली तरी भाला, भालाफेकीची काठी, धनुष्यबाण व खणण्याची काठी ही महत्त्वाची अश्मयुगीन अवजारे लाकडीच होती, हे निश्चित. हाडे व शिंगे यांजपासून बनविलेल्या अनेक वस्तू आजही टिकून राहिल्या आहेत. त्यांत प्रामुख्याने बाणांची टोके, मासेमारीसाठी छोटे काटेकारी बाण, गळ, सुया, दाभणे यांचा समावेश होतो. ह्यांपैकी काही वस्तूंची निर्मिती जरी  उत्तरपुराणा-श्मयुगात होऊ लागली असली, तरी त्यांतील वैविध्य व कौशल्य आंतराश्मयुगातच पाहावयास मिळते. या काळातच हस्तिदंताच्याही वस्तू बनविण्यात येऊ लागल्या.

अग्नी : तांत्रिक विद्यांच्या बरोबरीने अग्नीचेही मानवाला मोठे साहाय्य झाले आहे. अश्मयुगातील सर्वांत प्राचीन असे मानवसंबद्ध अग्नीचे अवशेष चीनमधील जोकोत्येन येथील गुहांत मिळाले आहेत. यदृच्छया निर्माण झालेला अग्नी तसाच तेवत ठेवण्याची कला जोकोत्येनच्या रहिवाशांना माहीत असावी. पुढे अश्म- युगाच्या विविध खंडांत सर्वत्र मानवाने अग्नीचा सतत उपयोग केलेला दिसतो, मात्र तो अग्नी त्याने उत्पन्न केला, की वणव्यासारख्या आगीची धग टिकवून धरली, हे सांगता येत नाही. लाकडे, हाडे किंवा क्वचित कोळसा (पॅलेस्टाइन) या कामाला सर्पण म्हणून वापरलेला असे. अग्नी निर्माण करण्याची विद्या उत्तरपुराणा- श्मयुगात साध्य झाली असण्याची शक्यता आहे. आंतराश्मयुगात व नवाश्मयुगात ती नक्कीच हस्तगत झाली होती. गारगोटी व लोखंडाचा अंश असलेला दगड यांच्या घर्षणातून अग्नी उत्पन्न करीत. अग्नीचा उपयोग कृत्रिम रीत्या उष्णता व उजेड निर्माण करणे, कच्चे मांस भाजून खाणे, जनावरांची चरबी दगडी दिव्यात घालून वाती जाळणे, जनावरांना घाबरवून स्वत:चे रक्षण करणे, काठ्यांची व हाडांची टोके भाजून ती टणक करणे इत्यादींसाठी होत असे. आंतराश्मयुग व नवाश्मयुग यांत अग्नीचा सुटसुटीतपणे वापर करता यावा म्हणून शेगड्या, चुली, भट्ट्या तयार करण्यात आल्या होत्या. स्वयंपाकाबरोबरच, मातीच्या मूर्ती अथवा भांडी भाजणे यांसाठीही नवाश्मयुगात अग्नीचा वापर झाला. अशा भट्ट्या काही नवाश्मयुगीन वसाहतींच्या अवशेषांत मिळाल्या आहेत. 

उपकरणे, भांडे इ. : पुराणाश्मयुगातील व आंतराश्मयुगातील अत्यंत अस्थिर आणि भटके जीवन लक्षात घेता, मानवाला काही साठवणाची गरज भासली असेल, असे वाटत नाही. साठवून ठेवण्यासाठी वेळ अथवा निकड त्याला भासावी असे पदार्थही त्या वेळी त्याच्याजवळ नव्हते. उत्तरपुराणाश्मकालीन गुंफांतील चित्रकारांनी वापरलेले दगडी दिवे सोडले, तर अन्य कसलेही भांडे ज्ञात नाही. पुढे नवाश्मयुगाच्या पूर्वार्धात जेरिको, जार्मो येथील माणूसही फक्त दगडीच भांडी वापरीत होता. यांत कटोरे, पेले असे काही प्रकार आढळतात. दगडी भांड्यांच्या घडणीत व सजावटीत थोडा फरक स्थलकालपरत्वे आढळतो. उदा., सायप्रसमधील खिरोकिटिया येथील भांडी घासून घासून झिलईदार करण्यात येत. परंतु त्यांच्या आकारात फारसे वैविध्य नाही. दगडाप्रमाणेच लाकडी ठोकळे कोरून त्यापासून भांडी तयार करण्यात येत असतीलही, परंतु त्यांचे आज अवशेष नाहीत.

नवाश्युगाच्या पूर्वार्धापर्यंत मृत्पात्रे करण्याची विद्या मानवाला हस्तगत झालेली नव्हती. नवाश्मयुगाच्या मध्यापासून अशी भांडी बनविण्याला आरंभ झाला. निदान पश्चिम आशिया व भूमध्य समुद्राभोवतालचा प्रदेश यांपुरते तरी हे विधान निश्चित पुराव्यांवर आधारलेले आहे. मृत्पात्रे तयार करण्याची विद्या केवळ याच लोकांना साध्य झाली, असे समजण्याचे कारण नाही. तिचा उगम निरनिराळ्या ठिकाणी स्वतंत्रपणेही झाला असेल. तद्वतच ती याआधीही कोणा समाजाला साध्य झाली असेल. पण प्रत्यक्ष आधाराने सांगता येते, ते फक्त पश्चिम आशियाविषयी. या कलेचा उगम कसा झाला याविषयी जी अनेक मते प्रचलित आहेत, त्यांत जास्त ग्राह्य अनुमान असे, की आधीपासून वापरात असणाऱ्या बांबूच्या टोपल्यांना माती लिंपण्यास आरंभ झाला. एखादी अशी टोपली केवळ योगायोगाने जळाली असावी व लिंपलेल्या मातीचे झालेले तुकडे हाती लागले. अशा अपघातातून मातीच्या दोन गुणांचा शोध लागला. ते म्हणजे–मनाजोगता आकार देता येणे व

 भाजूण काढले तर तो आकार पक्का होणे. याच माहितीचा उपयोग करून मृत्पात्रे करण्यास आरंभ झाला. भांडी करताना, त्यांना आधीपासून दगडी-लाकडी भांड्यांना देण्यात येणारे वाडगे, कुंडे यांसारखे आकार तर दिलेच पण ठेवरेवीला, विशेषत: पाणी व तत्सम द्रवपदार्थ यांच्या ने-आणीला, जास्त उपयुक्त अशी लहान तोंडाची भांडीही तयार करण्यात येऊ लागली. भोपळा, नारळ अशांसारख्या फळांवरून हे आकार सुचले असावेत. कदाचित या फळांच्या कवचांचा असा उपयोग यापूर्वीही केला जात असावा. लवकरच या भांड्यांना रंग लावून व त्यांवर नक्षी उमटवून ती सुशोभित करण्यासही सुरुवात झाली असावी. यापुढे निरनिराळे आकार, भांडी घडविण्याच्या पद्धती यांचे शोध लागत गेले. चाकाचा शोध लागला अधिक प्रमाणबद्ध व डौलदार भांडी तयार होऊ लागली. भांडी भाजण्यासाठी निरनिराळ्या प्रकारच्या भट्ट्याही वापरात आल्या. परंतु हा सर्व पसारा नवाश्मयुग व ⇨ताम्रपाषाणयुग  यांच्या संधिकालातीलच आहे.

बांबू, लव्हाळे व वेत एकत्र गुंफून, मासे पकडण्यासाठी खूप मोठाल्या टोपल्या आंतराश्मयुगीन यूरोपात (डेन्मार्क – एर्टेबोल संस्कृती) वापरीत. याच्या पुढची पायरी म्हणजे चटया विणणे आणि शेवटी घरगुती उपयोगाच्या लहानमोठ्या टोपल्या, दुरड्या विणणे ही होय. पॅलेस्टाइनमधील जेरिको व जार्मो आणि ईजिप्तमधील फायूम यांसारख्या ठिकाणच्या नवाश्मयुगीन थरांत मातीवर उमटलेल्या ठशांच्या स्वरूपात टोपल्या व दुरड्या यांचे अवशेष पाहावयास सापडतात. यांग-शो या चिनी नवाश्मयुगीन समाजास बुरूडकाम अवगत होते. अमेरिकेतील बुरूडकामाचा पुरावा साधारण पॅलेस्टाइनइतकाच इ.स.पू. सातव्या सहस्रकातील असून दक्षिण अमेरिकेतील बुरूडकाम अत्युकृष्ट दर्जाचे समजले जाते. 

धर्म : पुराणाश्मयुगातील व आंतराश्मयुगातील धार्मिक जीवनात मुख्य साधन म्हणजे गुहांतील चित्रे होत. ह्या गुहा मंदिरे वा प्रार्थनास्थळे म्हणून वापरण्यात येत असत. नवाश्मयुगात प्रथमच मंदिर किंवा प्रार्थनास्थान उभारलेले दिसते. मध्याश्मयुगातील व्हिस्टोनीसचे पुरोहिताचे घर सोडले, तर यापूर्वीच्या काळातील धार्मिक स्वरूपाची कोणतीच वास्तू मिळालेली नाही. जेरिका येथील मंदिरे आयताकार होती. क्वचित त्यांच्या समोर एक ओवरी आणि एक छोटासा मंडपही दिसतो. दारासमोरच्या भिंतीत कोनाडा करून त्यात दगडी खांब वा मूर्ती ठेवती. आर्पाकिया येथे एक प्रशस्त घुमटाकार मंदिर आहे. गाभारा गोल (व्यास ९ मी.) व त्यासमोर आयताकार मंडप (लांबी १८ मी.) आहे. दोन्ही ठिकाणी घराचीच रचना थोड्याफार फरकाने मंदिरासाठी वापरलेली आहे, हे स्पष्ट दिसते. तुर्कस्तानातील नवाश्मयुगीन अवशेषांत (कटाल हयुक) हीच गोष्ट अधिक स्पष्ट दिसते. तेथील मूर्तिकाम, भिंतीवरील चित्रे व शिल्पे यांमुळे या वास्तू धार्मिक उपयोगाच्या असाव्यात हे कळते. त्या वेळी धार्मिक वास्तूंना काहीं ठळक वैशिष्ट्ये प्राप्त झाली असावी, हे उब्राइड संस्कृतीच्या अवशेषांवरून स्पष्ट होते (एरिडू व टेपे गौरा). आयताकार दालनाच्या एका टोकाला मूर्तीचे पीठ अथवा स्थंडिल आहे. बाहेरून जोते बरेच उंच ठेवीत. अनेक भित्तिस्तंभ किंवा क्षेपप्रतिक्षेप आहेत. सुमेरियन काळातील ⇨झिगुरातसारख्या मंदिराच्या वास्तूंच्या रचनावैशिष्ट्यांचा उगम येथे पाहावयास सापडतो. ह्याशिवाय दगडी, मातीच्या वा हाडाच्या मूर्ती आणि थडगी यांवरूनही धार्मिक जीवनासंबंधी बरीच माहिती मिळते. त्याच्या धार्मिक कल्पना निश्चितपणे काय होत्या, ह्याविषयीचा कसलाच स्पष्ट पुरावा आज मिळत नाही. तसेच वैयक्तिक व सामाजिक स्मृतींतून निर्माण होणाऱ्या दंतकथा व परंपरा यांचीही माहिती आपल्याला नाही. मात्र पुरोहिताचे स्थान काय व तो काय कामे करीत असावा, याची थोडीफार कल्पना येते पण त्याच्या शक्तीचे गूढ समजत नाही.

जारणमारण यांसारख्या तंत्रांवर लोकांचा त्या वेळी विश्वास होता. एखाद्या जनावराच्या छोट्या प्रतिकृतीवर बाण लागल्याचे चित्र काढले, की तो प्राणी शिकारीत सहज हाती लागेल अशी कल्पना होती. फ्रान्स व स्पेन येथील अनेक गुहांत अशी कितीतरी चित्रे सापडतात. भालाफेकीच्या काठीवरील कोरीव चित्रेही याच उद्देशाने काढलेली असावीत. केवळ शिकारीवरच अवलंबून असणाऱ्या माणासाने आपल्या व्यवसायात अतिमानुषी शक्तींचे अशा तऱ्हेने साहाय्य मिळविण्याचा यत्न करावा हे स्वाभाविक वाटते. दुसरे तत्त्व म्हणजे जननतत्त्व होय. या तत्त्वाची आराधना करण्यात येत असल्याचा पुरावा अनेकविध स्वरूपांत सापडतो. वर उल्लेखिलेल्या मातृका-मूर्ती या त्यांतील प्रधान अवशेष होत. समागम करणाऱ्या पशूंच्या मूर्तीत हाच आशय आहे. एतद्विषयी काही क्रियाकर्मे (विधी) होत असावीत, असे फ्रान्समधील गुहेत असणाऱ्या पूर्णाकार नग्न स्त्रीमूर्तीवरून वाटते. तिसरी महत्त्वाची गोष्ट मरणोत्तर जीवनाविषयीची असून त्यात ‘आत्मा अमर आहे’ ही कल्पना पूर्वी पूर्वपुराणाश्मयुगातही मूळ धरून असावी. या कल्पनेच्या दोन पायऱ्या दिसतात. एक मृतात्म्याचा प्रवास व दुसरी पुनर्जन्म आणि तोही शक्यतो मानवी स्वरूपात दर्शविला आहे. यूरोपात सापडलेल्या निअँडरथल मानवाच्या थडग्यांतून अन्न, हत्यारे व क्वचित दागिनेही त्याच्या भोवती पुरलेले दिसतात. अन्न व हत्यारे ही त्याच्या मरणोत्तर जीविताची शिदोरीच होय. थोड्या नंतरच्या काळात पुरलेल्या प्रेतांचे पाय पोटाशी दुमडून घेतलेले आहेत. यांत आईच्या पोटात मूल याच अवस्थेत असते, हे प्रामुख्याने दाखवावयाचे असून पुनर्जन्माची प्रतीक्षा करणारा हा जीव भूमातेच्या पोटात त्याच अवस्थेत पुरण्यात येत असे. गुहेच्या जमिनीत किंवा क्वचित झोपड्यांच्या जमिनीखाली मृताला पुरण्यात येत असे. यावरून हा मृतात्मा घरादारांचे रक्षण करण्यासाठी तेथे ठेवीत, असा निष्कर्ष काही तज्ञ काढतात. गणचिन्हासंबंधीही अश्मयुगीन मानवाच्या काही विशिष्ट कल्पना होत्या. एखाद्या प्राण्याच्या अगंच्या काही विशेष शक्तींमुळे वा गुणांमुळे त्याला महत्त्व प्राप्त होऊन तो एकेका गटाचा वा कुलाचा पालक बनत असे आणि त्याची प्रतिकृती ही त्या गटाचा ध्वज किंवा निशाणी समजली जाई. ही निशाणी पतकरताना, त्या प्राण्याचे अतिमानुषी बल आपल्या पाठीशी सतत अभे राहावे, ही कल्पना त्यामागे असावी.

नवाश्मयुगात शिकारीचे महत्त्व ओसरले. साहजिकच त्यात यश मिळविण्यासाठी जादूटोण्याची गरजही आता सरली. तथापि पूर्वीच्या काही समजुती थोड्याफार फरकानिशी पुढे चालूच राहिल्या. त्यांपैकी मातृकामूर्ती नवाश्मयुगीन अवशेषांत फार मोठ्या प्रमाणावर सापडतात. जननक्रियेतील स्त्रीतत्त्वाचे पूजन या स्वरूपात होत राहिले, तसेच आता पुरुष तत्त्वाचेही पूजन सुरू झाले असावे. भूमध्य सागराभोवतीच्या प्रदेशातील कुऱ्हाडपूजा ही लिंगपूजेशी निकट समजली जाते. शिवाय पुरुषतत्त्वाची आराधना कबुतर व वृषभ या रूपांत करण्यात येई. मृतात्म्याची व्यवस्था अधिक बारकाईने करण्यात येऊ लागली. केवळ खड्डा करून त्यात प्रेत गाडण्याऐवजी आता रचनापूर्वक बांधलेली थडगी दिसू लागली. काही भागांत मोठी दगडी थडगी वा शवपेटिका वापरण्यात येऊ लागल्या होत्या. कदाचित डामडौलाचा व वैभवाचा निदर्शक असा हा भाग समजता येईल. बहुतेक थडग्यांतून मातृकामूर्ती ठेवण्यात आलेल्या आहेत. या मूर्ती म्हणजे पूर्वी अभिप्रेत असणाऱ्या पृथ्वीमातेची मूर्त रूपे होत. खास नवाश्मयुगात उत्पन्न झालेला धार्मिक घटक म्हणजे नैसर्गिक शक्तीची (पंचमहाभूतांची) उपासना करणारा घटक होय. यापुढे शेती करू लागणाऱ्या समाजांना वार्षिक ऋतुचक्राची कल्पना यावयास लागलेली दिसते. त्यातूनच शेतीस उपयोगी पडणाऱ्या सूर्य व पाऊस या दोन देवतांची उपासना मूळ धरू लागली असावी. यांची मूर्त स्वरूपात पूजा होण्याऐवजी त्यांच्या स्थित्यंतराचे व गमनागमनाचे प्रसंग सामुदायिक उत्सवरूपाने साजरे होऊ लागले. दुसरीकडे जननतत्त्वाचा आवाका वाढून पूर्वीप्रमाणे माणसे व पशू यांच्या प्रजोत्पादनाबरोबर किंवा त्याहीपेक्षा जास्त महत्त्वाची म्हणून जमिनीची सुपीकता त्यात समाविष्ट झाली. या समजुतींतून निर्माण झालेल्या वेगवेगळ्या देवदेवतांची पूजा-अर्चा व प्रार्थना यांसाठी वर सांगितलेली मंदिरे उभारण्यात आली असावीत.

  या सर्व समजुती, उत्सव, कल्पना ह्यांतून उत्तरनवाश्मयुगीनांना त्यांच्या पुराणकथा, दंतकथा-धर्म मिळाला असावा.

अलंकरण, कला इ. : उपजीविका कष्टसाध्य आणि एकूण जीवन अस्थिर असले, तरी मानवाची उपजत सौंदर्यदृष्टी व अभिरुची निरनिराळ्या प्रकाराने व्यक्त झालेली दिसते. त्यांतला सगळ्यांत महत्त्वाचा प्रकार म्हणजे अलंकरण. आपले शरीर सुशोभित करण्याची तीव्र इच्छा मानवाला सतत आहे. यासाठी चित्रविचित्र रंगांचे विलेपन ही सगळ्यात आरंभीची पायरी होय. अश्मयुगातील काही सांगाडेही गेरूने रंगविलेले आहेत. त्यांवरून अश्मयुगीन माणूस अंगाला रंग लावीत असावा, असा कयास करता येतो. दुसरा प्रकार म्हणजे, प्राण्यांची हाडे, दात, नखे किंवा वाळक्या बिया यांना भोके पाडून त्यांच्या माळा करून गळ्यात घालणे हा होता. आंतराश्मयुगीन अवशेषांत असे ताइतासारखे वापरलेले दात व हाडे खूप सापडतात. तिसरा प्रकार म्हणजे रंगीत वा चमकदार दगड घेऊन त्यांचे मणी, लोलक आणि ताईत तयार करणे व त्यांच्या माळा अंगाभोवती गुंडाळणे हा होता. चंद्रकोरीच्या, कुऱ्हाडीच्या किंवा पक्ष्याच्या आकाराचे ताईत सापडतात. पण बहुतेक ताईत हे तोड्याच्याच स्वरूपाचे समजावयास हवेत. नवाश्मयुगात दगडी मणी आणि ताईत यांचे विविध प्रकार पाहावयास मिळतात. अलंकारांकडे इतके लक्ष होते, की वस्त्रप्रावरणाकडे विशेष लक्ष देण्याची अश्मयुगीन माणसाला जरूरच भासली नसावी, इतका पुरावा मिळतो. अश्मयुगातील वस्त्रांचे प्रत्येक्ष अवशेष उपलब्ध नाहीत. माणसाचे पहिले चित्र उत्तरपुराणाश्मयुगातीलच पाहावयास मिळते. या चित्रणातून तो सहसा वस्रहीनच दिसतो. क्वचित काही मूर्तींवर (पूर्व यूरोप) केसाळ असे कपडे दाखविले आहेत. त्यावरून अतिशीत प्रदेशात जनावरांची कातडी लपेटून घेण्यात येत, पण इतरत्र वस्त्रांची जरूर भासत नव्हती. ही वस्त्रे शिवण्यासाठी वा ती बांधून घेण्यासाठी उपयोगी असे भोके पाडण्याचे दगडी टोचे व हाडांची दाभणे अवशेषांत मिळतात. जनावरांच्या केसांचा (लोकरीचा) कपड्यासाठी विणून उपयोग करीत किंवा काय, ते सांगता येत नाही.

गवताचे व अंबाडीसारख्या वनस्पतीचे धागे एकत्र विणून दोर तयार करीत. या दोरांचा उपयोग धन्युष्यांसाठी किंवा मासेमारीची जाळी विवण्यासाठी होत असे. सूत कातण्यास आरंभ नवाश्मयुगातच झाला. अवशेषांत चातीची, मातीची वा दगडी चाके मिळाली आहेत. तसेच मातीवर उमटलेले कापडाचे ठसे पॅलेस्टाइन व ईजिप्त येथील काही अवशेषांत मिळाले आहेत. इतरत्र अद्यापही चामड्याचेच कपडे वापरात असावेत. या अवशेषांतील मृत्पात्रांवर घागरा व जाकीट किंवा उपवस्त्र अशी दोन वस्त्रे काढलेली आढळतात. त्यांना गुंड्याही लावल्या आहेत. विणकाम व शिवण यांविषयीची अधिक माहिती नाही.

या प्रदीर्घ काळातील चित्रकला व मूर्तिकला यांचे अनेक नमुने आज उपलब्ध आहेत. यूरोप, आफ्रिका व आशिया हा तिन्ही खंडांत ते सापडतात. यांपैकी यूरोपात व आफ्रिकेत पूर्वपुराणाश्मयुगापासून थेट नवाश्मयुगापर्यंतच्या कलाकृती आहेत, तर आशियात सामान्यपणे आंतराश्मयुगीन कलाच दिसते. खुद्द नवाश्मयुगातील कलाकृतींचे प्रकार व त्यांची परंपरा पूर्णत्वे भिन्न आहे. पूर्वपुराणाश्मयुगातील चित्रकलेचे सर्वोत्तम नमुने फ्रान्स व स्पेन देशांतील गुहांतून सापडले आहेत. ही चित्रे गुहांत खूपच खोलवर, अगदी आतल्या भागांत काढलेली आहेत. उत्तरपुराणाश्मयुग व आंतराश्मयुग यांतील चित्रे जवळपास उघड्यावर असणाऱ्या दरडी व प्रस्तर यांवरच काढली आहेत. चित्रांच्या बाह्याकृती टोकदार दगडाने कोरून, पृष्ठभागावर उमटविलेल्या आहेत. यानंतर या आकृतींवर कुंचले किंवा फवारे यांनी रंग भरलेले आहेत. कुंचले बांबूच्या पट्ट्या किंवा काठ्यांची टोके ठेचून तयार कलेले असावेत. बहुतेक रंग नैसर्गिक रीत्या मिळतात तसेच वापरलेले आहेत. त्यांत मिश्रणाने बदल करण्याचा यत्न केलेला दिसत नाही. रंग देताना वर्ण्यविषयांनी अनुरूप असे स्वाभाविक रंग दिलेले आहेत. कित्येक वेळा रंग देण्याआधी खोदकाम करून आकृतीला उठाव देण्याचा प्रयत्न केलेला आहे. क्वचित माती थापून त्यातून उठावाची चित्रे केली आहेत. भोवताली वावरणारे गवे, रानरेडे, हरिणे, घोडे अशांसारखे प्राणी, प्राण्यांच्या शिकारींचे प्रसंग, नाच करणारे स्त्रीपुरुष, धार्मिक विधी करणारा पुरोहित हे प्रमुख चित्रविषय होत. स्पेनमधील काही गुहांतून वर्तुळे, चौकटी व तजन्य भौमितिक आकृत्या रेखाटल्या आहेत. उत्तरपुराणाश्मयुग आणि आंतराश्मयुग यांमध्ये रंगीत चित्रांऐवजी दगडाचा पृष्ठभाग खरवडून किंवा टाकी लावण्यासारखा ठोकून बाह्यकृती उमटविण्यात येत असे. अशा चित्रांना बहुधा रंग दिलेला नाही. मूर्तिकलेचे नमुने उत्तरपुराणाश्मयुगीनच आहेत. त्यांत हाडे, शिंगे व दगड यांवरील कोरीव कामाचा समावेश करता येतो. भालाफेकी काठ्या, पुरोहिताच्या हातातील दंड, यांवर अत्यंत वास्तवपूर्ण उत्थित शिल्पे खोदली आहेत. जनावरांच्या डोक्याच्या आकाराचे हाडांचे काही ताईतही मिळाले आहेत. दगडी कामांत स्त्रीमूर्ती मुख्य असून त्या अर्धाकृतीच्या व पूर्णाकृतीच्या स्वरूपांत आहेत. स्थूल शरीराच्या या मूर्तीचे नितंब, स्तन व जघनप्रदेश विस्तृत दाखविले आहेत. स्त्रीच्या जननकार्याकडे लक्ष वेधविण्याचा कलाकाराचा प्रमुख हेतू असावा. म्हणून यांना सामान्यपणे ‘स्त्रीमूर्ती’ म्हणत असले, तरी ‘मातृकामूर्ती’ म्हणणे जास्त सयुक्तिक ठरेल. नवाश्मयुगातील अवशेषांत चित्रकलेचे नमुने नाहीत. या कालखंडाच्या उत्तरार्धात मृत्पात्रांवर काढण्यात आलेल्या नक्षीत वेलपत्त्या, पशुपक्षी, भौमितिक आकृत्या अशा विविध आकृत्या असल्या, तरी या कामाचा चित्रकलेत समावेश करणे योग्य ठरणार नाही. मातीच्या भाजून केलेल्या आणि हाडाच्या मूर्ती, यांतील प्राणिमूर्ती व स्त्रीमूर्ती विशेष चांगल्या प्रकारे केलेल्या आहेत. यांतील स्त्रीमूर्ती मातृका-परंपरेतीलच आहेत. पूर्वीप्रमाणे या मूर्तीचे डोकेही केवळ एका गोळ्याने दाखवितात आणि नाकडोळेही कोरलेले नसतात.

 पूर्वपुराणाश्मयुगातील कलाकृती म्हणजे आपल्या भोवताली दिसणार्‍या वस्तूंची केवळ नक्कल व प्रतिकृती नव्हे त्यांत निरनिराळे प्रसंग व परिस्थिती कल्पिली आहे. माणसाच्या प्रतिभाविलासाचा हा सर्वप्राचीन आविष्कार होय. विशेषत: गुहेतील चित्रकाम या दृष्टीने अत्यंत लक्षणीय समजावे लागते. मानवी बुद्धी व मन यांची एक वेगळीच झेप त्यांतून प्रतीत होते. परंतु या सगळ्या कलाकृती सौंदर्यनिर्मितीच्या उद्देशाने तयार करण्यात आल्या नाहीत हे निश्चित. त्यांत काही धार्मिक समजुती व कल्पना अंतर्भूत असाव्यात. किंबहुना पुराणाश्मयुगकालीन धार्मिक कल्पना आणि समजुती यांच्या माहितीचे मुख्य साधन म्हणजेच तत्कालीन चित्रकला होय [→प्रागैतिहासिक कला]. 

अश्मयुग, भारतातील: भारतात आजतागायत झालेले उत्खनन व संशोधन अश्मयुगातील कोणत्याच अवस्थेतील मानवाच्या जीविताचे स्पष्ट चित्र डोळ्यासमोर उभे करू शकत नाही. त्यातल्या त्यात नवाश्मयुगीन जीवनाविषयी थोडीशी तरी माहिती हाती येते पण इतर युगांतील मानव, त्याची वस्ती, त्याच्या भोवतालची सृष्टी, यांच्याविषयी जी कल्पना येते, ती फारच अंधुक व अस्पष्ट आहे. याचे साधे कारण असे, की अश्मयुगीन मानवाच्या जीवनावर प्रकाश पाडणारे जे अवशेष मिळाले आहेत, ते तुरळक व फुटकळ स्वरूपाचे आहेत. त्यांवरून त्याची जीवनपद्धती लक्षात येऊ शकत नाही व एकूण जागतिक अश्मयुगीन मानवी संस्कृतीशी असणारे त्याचे नातेही उलगडू शकत नाही. जे काही निष्कर्ष काढण्यात आलेले आहेत, ते फक्त दगडी आयुधे व उपकरणे यांच्या  वर्गीकरणांतूनच. निरनिराळ्या वर्गांची यूरोपीय व आफ्रिकी वर्गांशी तुलना करून सांस्कृतिक टप्पे व कालक्रम यांविषयी विवेचन करण्यात आलेले आहे. या अवस्थांचा भूस्तरीय घडामोडींशीही कसा संबंध लावता येईल, या प्रश्नाचाही नीट निर्णय लागलेला नाही. या मर्यादा ध्यानात ठेवूनच भारतातील अश्मयुगासंबंधीच्या माहितीची नोंद घेतली जावी.

  भारतीय अश्मयुगाचे चार खंड पाडण्यात येतात–पूर्वाश्मयुग, मध्याश्मयुग (कार्बन कालनिर्णयानुसार हा काळ ४०,००० वर्षांपूर्वीचा आहे, हे आता सिद्ध झाले आहे), उत्तराश्मयुग, आणि नवाश्मयुग यांतील नवाश्मयुगीन जीवनाचे स्वरूप जगाच्या इतर भागातील नवाश्मयुगातल्यासारखेच आहे. त्यापूर्वीच्या तीन कालखंडांतील सांस्कृतिक स्थिती, तदर्थक यूरोपीय संज्ञांत जे अभिप्रेत आहे तशी दिसत नाही. त्या अर्थाने उत्तरपुराणाश्मयुगाचा तर भारतात आढळही होत नाही. परंतु सांस्कृतिक अवस्था स्पष्ट करण्याच्या दृष्टीने सामान्यपणे भारतातील पूर्वाश्मयुग = यूरोपातील पूर्वपुराणाश्मयुग भारतातील मध्याश्मयुग = यूरोपातील मध्यपुराणाश्मयुग आणि भारतातील उत्तराश्मयुग = यूरोपातील उत्तरपुराणाश्मयुग अशी समीकरणे मांडता येतील. 

पूर्वाश्मयुगातील आयुधांचे दोन स्पष्ट गट पडतात. एक गट वायव्य भारत व काश्मीर या भागापुरता असून, दुसरा भारताचा इतर प्रदेश, मुख्यत: आंध्र-तमिळनाडू इ. भागांत पसरला आहे. पहिल्या गटातील हत्यारे गोटे व मोठाली छिलके यांची बनविलेली आहेत. गोलसर बाजू पंजात पकडून खालच्या, सरळ धारेच्या बाजूने वस्तूंचे तुकडे पाडणे, हे या हत्यारांचे मुख्य काम होते. त्यांना चॉपर म्हणतात. पहिल्या गटात असे चॉपर व तत्सम प्रकार आढळतात. दुसऱ्या गटात, मुख्यत्वे छिलके व कपच्या दोन्ही बाजूंनी घडवून तयार केलेली बदामी आकाराची हातकुऱ्हाड हे मुख्य आयुध आहे. हे दोन्ही गट भौगोलिक दृष्ट्या अलग असले, तरी कालदृष्ट्या निकट आहेत–प्राय: समकालीनच असावेत. द्वितीय हिमयुगाच्या शेवटापासून येथे दोन्ही प्रकारची हत्यारे घडविण्यात आली. तृतीय हिमयुगात या संस्कृतीचा विस्तार व तंत्रज्ञान यांचा परमोत्कर्ष झाला पण या युगातील मानवाच्या शरीराचे कोणतेही अवशेष मिळालेले नाहीत.

कोकणपट्टीसारखे एका बाजूचे प्रदेश सोडले, तर भारताच्या बहुतेक सर्व भागांत मध्याश्मयुगीन आयुधे मिळाली आहेत. ही आयुधे चर्ट, जास्पर अशांसारख्या टणक व एकसंध दगडांपासून बनविलेली असून पूर्वाश्मयुगीन आयुधांपेक्षा खूपच लहान आहेत. यांत हरतऱ्हेच्या तासण्या, भोके पाडण्यास उपयुक्त अशी चोच असणारी हत्यारे बऱ्याच संख्येने सापडतात. कातडी कापण्यास व शिवण्यास त्यांचा उपयोग होत असावा. त्यांबरोबर छोट्या हातकुऱ्हाडीही आढळतात. वरील दगडांची छिलके व क्वचित पातीही दिसतात. मध्य-अभिनूतन काळाच्या शेवटच्या सहस्त्रकांपासून तो नूतनतम काळाच्या आरंभापर्यंत या युगाचे अस्तित्व होते. या काळी हवामान फारसे आर्द्र नसून घनदाट अशी जंगलेही फारशी पसरली नव्हती. या वेळच्या मानवाच्या शरीराचे अवशेष उपलब्ध नाहीत. आतापर्यंत रानटी बैल व भीमगज यांची हाडे सापडली आहेत. 

मध्याश्मयुगाचा काळ ४०,००० वर्षांपूर्वीचा आहे, हे आता कार्बन कालनिर्णयानुसार सिद्ध झाले आहे. उत्तराश्मयुगाचा आरंभ नूतनतम काळाच्या आरंभी (इ.स.पू. १०,०००) झाला. काही भागांत तो इ.स.पू. ७,००० इतका नजीकचाही असू शकेल. मध्य व उत्तर भारताच्या काही भागांत असणारे घनदाट जंगलांचे प्रदेश सोडल्यास, इतरत्र मानवाची वस्ती उघड्यावर नदीकाठाने होती. पण या दोन जंगलांच्या प्रदेशांत मात्र मानवी वस्ती प्रस्तरालये व गुहा यांतच होती. या प्रस्तरालयांतील चित्रकामही उत्तराश्मयुगीनच असण्याचा संभव आहे. या युगातील आयुधे, लघुअश्मास्त्रे याच सदरात जमा होतात व यांत मुख्यत्वे गारेच्या दगडाची किंचित लांबटशी पाती आहेत. त्यांपासून चाकूची पाती, चंद्रकोरी, टोचे ही आयुधे तयार करण्यात येत. ती आयुधे हाडे व काठ्या यांजबरोबर वापरण्यात येणारी, म्हणजे संयुक्त आयुधे होत. ⇨ लांघणज  या गुजरातमधील ठिकाणाखेरीज अन्यत्र उत्तराश्मयुगीन स्थायिक वसाहतींचे अवशेष उपलब्ध नाहीत. शिकार, मच्छीमारी व प्राथमिक स्वरूपाची शेती हीच या काळातील उपजीविकेची मुख्य साधने होत. मृत्पात्रांचा वापरही सुरू झाला असावा. लांघणज याच ठिकाणी काही मानवी सांगाडे सापडले असून ते मिश्र वंशाचे आहेत. हातपाय पोटाशी ठेवून हे सांगाडे थडग्यांत पुरण्यात आले होते. या भागात पाणघोडे, अस्वले, हरणे, सांबरे, रानगाई असे प्राणी वावरत असत. 

भारतातील नवाश्मयुग आणि ताम्रपाषाणयुग ही दोन्ही साधारण समकालीनच आहेत. नवाश्मयुगीन म्हणून ओळखल्या जाणाऱ्या अवशेषांतही तांब्याच्या वस्तू सापडतात. ताम्रपाषाणयुगीन समाजही नवाश्मयुगीनांप्रमाणेच शेतकी, पशुपालन यांवरच जगत असे. म्हणून या दोन स्वतंत्र अवस्था समजाव्यात किंवा कसे, यावर तज्ञांत एकमत नाही. तथापि घासून गुळगुळीत केलेल्या दगडी कुऱ्हाडी वा छिन्न्या यांसारखे आयुधप्रकार आणि इतर ठिकाणच्या नवाश्मयुगीनांशी असणारी साम्ये ध्यानात घेऊनच काही समाजांना नवाश्मयुगीन तर काहींना ताम्रपाषाणयुगीन संबोधण्यात येते. भारतातील ताम्रपाषाणयुगाचे तीन पृथक भाग पडतात. एक उत्तर व वायव्य भारतातील, दुसरा पूर्व भारतातील व तिसरा दक्षिण भारतातील. या सर्व संस्कृतीचा काळ इ.स.पू. दुसरे सहस्रक व त्याच्या थोडा पुढे मागे असा आहे. याला अपवाद फक्त बलुचिस्तानच्या सरहद्दीनजीकच्या ⇨कुल्ली, झॉब या संस्कृतींचा असून त्या संस्कृती इ.स.पू. चौथ्या सहस्रकातील आहेत. परंतु भारतातील इतर समाजांशी त्यांचा सलग संबंध अद्याप प्रस्थापित झालेला नसल्याने व पश्चिम आशियातील नवाश्मयुगीन संस्कृतींशी त्यांचा जास्त निकटचा संबंध स्पष्टपणे दिसत असल्याने, त्यांना त्या क्षेत्रातील संस्कृतीच्या शाखा समजणे अधिक उचित ठरेल.

उत्तर भारताच्या वैशिष्ट्यपूर्ण अशा नवाश्मयुगीन संस्कृतीचा आढळ प्रामुख्याने काश्मीरमध्ये झेलमच्या खोऱ्यात झाला आहे. बूर्झाहोम येथील उत्खननांत गवसलेल्या अवशेषांवरून या समाजाच्या जीवनविकासाचे दोन टप्पे दिसतात. पहिल्यात, जमिनीत मोठाले खड्डे करून त्यांत वस्ती करण्यात येई. हे खड्डे सामान्यपणे तीन मी. व्यासाचे असून त्यांची खोली दीड ते चार मी. होती. यावर फांद्या व गवत यांचे छप्पर असावे. घासून धार लावलेली दगडी हत्यारे, हाडांचे टोचे, दाभण, राप्या व हातघडणीची मृत्पात्रे ही येथील सांस्कृतिक वैशिष्ट्ये होत. दुसऱ्या टप्प्यात, कच्च्या विटांची घरे बांधण्यात येऊ लागली. मृत्पात्रे घडविण्यासाठी चाकाचा वापर सुरू झाला. क्वचित तांब्याची हत्यारे सापडतात पण धातूच्या उपयोगाचे ज्ञान अगदी प्राथमिक स्वरूपाचे असावे. बी पेरण्याकरिता जमिनीत खळगे करण्यासाठी अणकुचीदार काठ्या वापरीत व त्या जोराने जमिनीत घुसाव्यात म्हणून त्यांभोवती दगडी कडी बसवीत. अशी वजने व दगडाचे विळ्यासारखे हत्यार सापडले आहे. यांवरून शेती करण्यात येई असा निष्कर्ष निघत असला, तरी हाडाच्या हत्यारांचे जे विविध प्रकार दिसतात त्यांवरून शिकारीलाच प्राधान्य असावे, असे दिसते. या काळातील काही थडग्यांत माणसांबरोबर कुत्रीही गाडलेली दिसतात. थडग्यातील सांगाड्यांवरून तेथील माणसांच्या वंशांची कल्पना येत नाही. जमिनीत खड्डे करून राहण्याची पद्धत व दगडी विळे यांवरून उत्तर भारतातील ही संस्कृती तत्कालीन चिनी नवाश्मयुगीन संस्कृतीशी संबद्ध असावी, असे मानता येते.

दुसरे क्षेत्र म्हणजे, ओरिसा, बिहार, आसाम या क्षेत्रांतील नवाश्मयुगीन संस्कृतीचे पूर्वक्षेत्र. गोल बुडाच्या दगडी कुऱ्हाडी, छिन्न्या व मुख्यत: चौकोनी खांद्यांच्या दगडी कुऱ्हाडी ही येथे सापडणारी वैशिष्ट्यपूर्ण आयुधे होत. या क्षेत्रातील निरनिराळ्या ठिकाणची मृत्पात्रे भिन्न प्रकारांची आहेत. येथे झालेले संशोधन पूर्ण कल्पना देण्यास पुरेसे नसले, तरी त्यातील विशिष्ट आयुधांवरून या संस्कृतीचा अन्यत्र जोडता येतो.

तिसरे क्षेत्र दक्षिण भारतातील नवाश्मयुगीन संस्कृतीचे. हे क्षेत्र उत्तर कर्नाटक व वायव्य आंध्र प्रदेश यांचे मिळून होणारे असून येथे मोठ्या प्रमाणावर उत्खनने करण्यात आली आहेत. त्यांपैकी ⇨ ब्रह्मगिरी,  पिकलीहाल, टेक्कलकोटा ही महत्त्वाची होत. तेथे गोल वा चौकोनी आकाराच्या कुडाच्या घरांतून मानवी वस्ती होती. क्वचित वस्तीसाठी उंच अशा टेकड्यांवरील सपाट भागांचा उपयोग केलेला दिसतो. पहिल्या कालखंडात हातघडणीची राखी मृत्पात्रे वापरीत. दुसऱ्या कालखंडातील मृत्पात्रे तांबूस काळसर रंगाची आहेत. कोठेकोठे रंगीत नक्षीकाम केलेली मृत्पात्रेही या कालखंडात वापरलेली दिसतात. घासून गुळगुळीत केलेल्या कुर्‍हाडी, छिन्न्या यांसारख्या हत्यारांबरोबर दगडी पात्यांचा उपयोग मोठ्या प्रमाणावर करण्यात येत असे. दफनाची पद्धती अस्तित्वात असून मृताशेजारी त्याची आयुधे व भांडीही ठेवलेली आढळतात. या नवाश्मयुगीन संस्कृतीचा संबंध इतर भागांतील तत्सम संस्कृतींशी जोडण्याइतका प्रत्यक्ष पुरावा हाती नसला, तरी काही वैशिष्ट्यपूर्ण वस्तूंवरून, वर उल्लेखिलेल्या वायव्य भारतातील संस्कृतीप्रमाणेच ह्याचाही संबंध पश्चिम आशियातील नवाश्मयुगीनांशी असावा असे दिसते. तथापि निश्चित संबंध जोडता आलेले नाहीत, हे मान्यच करावयास हवे. वरील तिन्ही क्षेत्रांत पशुपालन व शेतकी हीच उपजीवविकेची प्रमुख साधने होती.

पहा : प्रागितिहास मृत्पात्रे मानववंश पुरावत्त्वीय उत्खनने.

संदर्भ : 1. Childe, Gordon, New Light on the Most Ancient East, London, 1958.

           2. Clark, Grahame, World Prehistory–An Outline, Cambridge, 1961.

           3. Clark,Grahame Piggott, Stuart, Prehistoric Societies, London, 1965.

           4. Day, Michael M. Guide to Fossil Man, London, 1965.

           5. Jacquetta, Hawkes Wooly, Leonard, Prehistory and the Beginnings of  Civilization History of Mankind, Vol.1, London, 1963.

           6. Leakey, L. S. B. Adam’s Ancestors, London, 1960.                                                   

           7. Mate, M. S. Misra, V. N.Indian Prehistory, Poona, 1964, 1965.

           8.Piggott, Stuart, Ed. The Dawn of Civilization, London, 1961.

           9. Sankalia, H. D. Prehistory and Protohistory of India and Pakistan, Bambay, 1963.

         10. Sankalia, H. D. Stone Age Tools, Poona, 1964.

         11. Semenov, S. A. Trans. Thompson, M. W. Prehistoric Technology, London, 1964.

         12. Singer, C.History of Technology, Vol. I, Oxford, 1954.

         13. Stern Philip Van Doren, Prehistoric Europe, London, 1970.

देव, शां. भा. ढवळीकर, म. के.

marathivishwakosh.org
आद्य-पुराश्मयुग (Lower Palaeolithic)
Post author:सुषमा देव
5–6 minutes
पुरातत्त्वशास्त्रात मानवी इतिहास हा स्थूलमानाने तीन कालखंडांत विभागला गेला आहे. या काळात मानवाला लेखनकला अवगत नव्हती. त्यामुळे पुरातत्त्वीय अवशेष हे प्रामुख्याने दगडी हत्यारांच्या रूपात मिळतात. या कालखंडाला अश्मयुग असे संबोधले आहे. अश्मयुगीन मानवाने मुख्यतः दगडी हत्यारे वैशिष्ट्यपूर्ण तंत्रावर आधारित विकसित केली आणि या आधारावर अश्मयुगाची विभागणी पुराश्मयुग (Palaeolithic), मध्याश्मयुग (Mesolithic) आणि नवाश्मयुग (Neolithic) या तीन संस्कृतींमध्ये केली आहे. यातील पुराश्मयुग हे आद्य (Lower Palaeolithic), मध्य (Middle Palaeolithic) आणि उत्तर पुराश्मयुगात या तीन कालखंडांत विभागले आहे. प्रत्येक कालखंडात दगडी हत्यारे बनविण्याच्या तंत्रपद्धती आणि हत्यारांचे प्रकार भिन्न आहेत.

पूर्व आफ्रिकेतील इथिओपियातील अफार त्रिकोणीय प्रदेश, टांझानियातील ओल्डोवाय गॉर्जमध्ये (घळई) आणि दक्षिण अफ्रिकेतील अनेक अतिप्राचीन गुहांमध्ये मानवी उत्क्रांती दर्शविणारे विविध पुरामानवाचे अश्मीभूत सांगाडे /अवशेष आणि आद्यपुराश्मयुगीन दगडी हत्यारे मोठ्या प्रमाणात सापडली आहेत. यामुळे आफ्रिका खंड हे मानवाची उत्क्रांती आणि अश्मयुगीन संस्कृतीचे उगमस्थान आहे, असे मानले जाते.

आफ्रिका खंडात आद्य-पुराश्मयुगात, आदिमानवाने दगडी हत्यारे बनविण्यासाठी दोन पद्धतींचा अवलंब केलेला आढळून येतो. यातील सर्वांत प्राचीन पद्धतीमध्ये प्रामुख्याने गोटा परंपरेतील दगडी हत्यारे बनविण्याचे तंत्र विकसित केले गेले. या पद्धतीला ओल्डॊवान परंपरा (Oldowan Tradition) असे संबोधण्यात येते. या परंपरेची सुरुवात साधारणतः २६ लाख वर्षांपूर्वी झाली होती. इथिओपियातील अफार त्रिकोणीय प्रदेशातील खचदरीत (African Rift Valley) गोना (Gona) आणि लेडी गेरारू (Lady Geraru) येथे आजमितीला जगातील सर्वांत जुनी म्हणजेच २५ ते २६ लाख वर्षांर्पूर्वीची ओल्डॊवान परंपरेची दगडी हत्यारे मिळालेली आहेत. या शिवाय हत्यारांबरोबर आर्डीपिथेकस आणि होमो इरेक्टसचे अश्मीभूत अवशेष मिळाले आहेत. ओल्डॊवान परंपरेची हत्यारे होमो हॅबिलिस या मानवाने तयार केली होती.

जॉर्जिया (यूरेशिया) मधील दमानिसी (Dmanisi) येथील उत्खननात मिळालेल्या पुरामानवाच्या अश्मीभूत कवट्या आणि त्यासोबत दगडी हत्यारांचे कालमापन १८ लाख वर्षपूर्व आहे. ही दगडी हत्यारे ओल्डॊवान किंवा त्या आधीची असावीत. या नवीन संशोधनावरून असे दिसते की, आफ्रिकेत होमो इरेक्ट्स प्रजाती अस्तित्वात येण्यापूर्वी पुरामानवाने यूरेशियात पाऊल ठेवले होते.

कालानुक्रमे १७ लाख वर्षांपूर्वी दुसरे तंत्र विकसित झाले. छिलका हत्यारांचा समावेश असलेल्या या परंपरेला ॲश्युलियन संबोधले जाते. ॲश्युलियन संस्कृतीमध्ये (लार्ज फ्लेक ॲश्युलियन) १० सेंमी. पेक्षा मोठ्या छिलक्यांपासून हत्यारे तयार करत असत. ही पद्धत ओल्डॊवान परंपरेपेक्षा वेगळी आहे. मोठे छिलके हे मोठ्या दगडापासून तोडून वेगळे करत असत. दगडी हत्यारे मोठ्या आकाराच्या छिलक्यापासून अथवा गोट्यापासून अथवा छिलके काढलेल्या मोठ्या गाभ्यापासून बनविली जात. सुरुवातीच्या काळातील हत्यारे अगदी ओबडधोबड आणि वेड्यावाकड्या आकाराची आढळून येतात. कालांतराने पुरामानव उत्कृष्ट धारदार हत्यारे बनवू लागला. हत्यारे बनविताना मोठे व खोलगट छिलके अथवा चिपा काढण्याऐवजी लहान व पातळ चिपा काढण्यास सुरुवात केली. त्यामुळे हत्यारे ओबडधोबड न होता सुबक, प्रमाणबद्ध व धारदार कडा असलेली होऊ लागली. मोठ्या छिलक्यांपासून बनवलेल्या हत्यारांमध्ये हातकुऱ्हाड (Handaxe), फरशी (Cleaver), तोडहत्यारे (Chopper), तासण्या (Scraper) इत्यादींचा समावेश होतो.

आद्य-पुराश्मयुगीन ॲश्युलिअन संस्कृतीचा विस्तार हा आफ्रिका, यूरोप आणि आशिया खंडात झालेला होता. इतर खंडांमध्ये आपल्याला ॲश्युलिअन संस्कृतीचे अवशेष आढळून येत नाहीत. अश्युलिअन परंपरेची हत्यारे मोठ्या प्रमाणात होमो इरेक्टसने बनविली. आफ्रिका खंडात केनियातील कोकिसेली (Kokiselei), टांझानियातील ओल्डोवाय गॉर्ज आणि इथिओपियातील गोना व कॉन्सो  (Konso) येथे मिळालेली अश्युलिअन परंपरेची हत्यारे १७ लाख वर्षांपूर्वीची आहेत.

यूरोप खंडात स्पेनमधील सोलाना डेल झाम्बोरीनो (Solana del Zamborino) व एस्टरेको डेल क्वीपार  (Estrecho del Quipar) या दोन गुहांमध्ये ९ लाख वर्षपूर्व काळातील ॲश्युलिअन परंपरेची दगडी हत्यारे मिळाली आहेत.

आशिया खंडात ॲश्युलियन संस्कृतीच्या पाऊलखुणा भारतातील अतिरमपक्कम (तमिळनाडू) येथे १५ लाख वर्षांपासून अस्तित्वात आहेत, तर कर्नाटकातील इसामपूर येथे १२ लाख वर्षेपूर्व काळात त्या दिसतात. महाराष्ट्रात गोदावरीच्या खोऱ्यामध्ये चिरकी ऑन प्रवरा आणि लक्ष्मी नाला, नेवासा ही स्थळे साधारणपणे ८-१० लाख वर्षे (आद्य प्लाइस्टोसीन) जुनी आहेत आणि भीमा खोऱ्यात मोरगाव आणि बोरी ही स्थळे ८ लाख वर्षांपूर्वीची आहेत. चीनमध्ये ॲश्युलियन परंपरेची दगडी हत्यारे ८ ते ९ लाख वर्षपूर्व या काळातील आहेत.

ॲश्युलिअन संस्कृती ही १७ लाख वर्षपूर्व ते सव्वा लाख वर्षांपर्यत अस्तिवात होती. ही संस्कृती अस्तिवात असतानाच साधरणपणे साडेतीन लाख वर्षांपूर्वी मध्य पुराश्मयुगीन परंपरेची दगडी हत्यारे असणारी संस्कृतीची सुरुवात झाली.

संदर्भ :

Diez-Martín, F.; Sánchez Yustos, P.; Uribelarrea, D. & others ‘The Origin of The Acheulean: The 1.7 Million-Year-Old Site of FLK West, Olduvai Gorge (Tanzania)ʼ, Scientific Reports 5, 17839, https://doi.org/10.1038/srep17839, 2016.
Pappu, Shanti; Gunnell, Yanni; Kumar, Akhilesh; Braucher, Régis; Taieb, Maurice;  Demory, François & Thouveny, Nicolas, ‘Early Pleistocene Presence of Acheulian Hominins in South Indiaʼ, Science, 331: 1596-1600, 2011.
                                                                                                                                                                                     समीक्षक : शरद राजगुरू

https://www.mymahanagar.com/featured/saransh/discovery-of-the-stone-age-chitrashala-in-maharashtra/

शोध महाराष्ट्रातील अश्मयुगीन चित्रशाळेचा!
शोध महाराष्ट्रातील अश्मयुगीन चित्रशाळेचा!
written By My Mahanagar Team
January 21, 2024 3:15 AMMUMBAI
Subscribe
अमरावती येथील सहा हौशी निसर्ग संशोधकांना महाराष्ट्र आणि मध्य प्रदेशच्या सीमेवर तापी खोर्‍यातील सातपुडा पर्वतात अश्मयुगीन गुहाचित्रे सापडली आहेत. या संशोधकांच्या टीमने ७ वर्षांच्या अथक प्रयत्नानंतर १५ ते २० हजार वर्षांपूर्वीच्या तब्बल १८ अश्मयुगीन गुहाचित्रांचा शोध लावला आहे. या संशोधन कार्याची भोपाळ व केरळमधील सुलतान बथेरी येथे पार पडलेल्या रॉक आर्ट सोसायटी ऑफ इंडिया आणि ऑर्किओलॉजिकल सर्व्हे ऑफ इंडिया यांच्या १३व्या परिषदेत विशेष दखल घेण्यात आली आहे. महाराष्ट्रात अश्मयुगीन गुहाचित्रांचा हा पहिलाच शोध असल्याचे जाहीर करण्यात आले आहे.

-रणजितसिंह राजपूत

अमरावतीपासून उत्तरेस ९० किलोमीटर अंतरावर महाराष्ट्र आणि मध्य प्रदेशच्या सीमारेषेवर असलेल्या सातपुडा पर्वताच्या कुशीत सुमारे २० ते ३० किलोमीटरच्या परिसरात ही गुहाचित्रे विखुरली आहेत. त्यातील चित्रे काहीशी पुसट झाली असली तरी ओळखू येण्याइतपत चांगल्या स्थितीत आहेत. सुमारे १५ ते २० हजार वर्षांपूर्वी अश्मयुगातील मानव जेव्हा समूहाने राहायचा त्यावेळी तो सुरक्षा, अन्न, पाणी इत्यादी बाबींचा अभ्यास करून आश्रयस्थानांची निवड करायचा.

वनातील कंदमुळे खाऊन आणि शिकार करून त्यावर तो आपली उपजीविका चालवत असे. प्रामुख्याने शिकार हा प्रमुख व्यवसाय असल्याने प्राण्यांच्या शिकारीचे अशा चित्रांद्वारे नियोजन करून त्यावर जादूटोणा करून शिकार आपल्या टप्प्यात आणण्याची अंधश्रद्धा पूर्वीच्या मानव समूहात होती. धोकादायक प्राणी आणि उपयुक्त प्राण्यांचे ज्ञान समूहातील तरुणांना व्हावे यासाठी शिक्षण संवादाचे साधन म्हणून या गुहाचित्रांचा त्यावेळी वापर केला जात असावा, असे तज्ज्ञांचे मत आहे.

अमरावतीहून सुमारे ८५ किमी अंतरावर मोर्शी ते चांदूरबाजार चिखली सावंगीमार्गे धारूर गावाजवळून दिसणार्‍या सातपुडा पर्वतावर सर्वात उंचीवर असलेल्या मुंगसादेव या १४३ फूट, २५ फूट रुंद आणि तेवढ्याच उंचीच्या रहस्यमयी गुहेत प्रचंड शिळेवर ही चित्रे काढलेली आहेत. त्यात आहेत वन्यप्राणी, वाघ, हत्ती, जिराफासारखा प्राणी, गेंडा, रानगवे, सांबर, चितळ, रानडुक्कर, अस्वले, वानर, रानकुत्रे, गिधाड, इ. गेरूसारख्या लाल रंगात ती साकारली आहेत. एवढेच नाही तर एका गुहेत झाडावरील फांदीला झोके घेणार्‍या आदिमानवाचे चित्रही तेथे काढले आहे.

या मानवाचे पाय मात्र वानरांच्या पंजासारखे दाखवले गेले आहेत. कळपाने राहणार्‍या वन्यप्राण्यात एके ठिकाणी रानकुत्र्यांचा कळप चित्रित केला आहे. जवळपास ७०-८० फूट रुंदीच्या आणि ४० फूट उंचीच्या या धनुष्यबाणासारख्या अर्धगोलाकार शिळेवरील या चित्रांचं वैशिष्ठ्य म्हणजे ती तळापासून चार फूट उंचावर डावीकडून उजवीकडे शेवटपर्यंत विशिष्ट अंतरावर निर्माण केली आहेत. पाच- पंचवीस जणांच्या समूहाला समोर बसवून ती प्रत्येकाला दिसू शकतील अशी त्यांची रचना आहे. हजारो वर्षांपूर्वी अश्मयुगातील आदिमानव जेव्हा समूहाने पर्वतावरील गुहेत राहायचा त्यावेळी तो शिकार व कंदमुळे खाऊन जगायचा.

धोकादायक प्राणी कोणता आणि उपयुक्त कोणता याचे ज्ञान समूहातील तरुणांना व्हावे यासाठी शिक्षण व संवादाचे साधन म्हणून या गुहाचित्रांचा वापर केला असावा, असेही म्हटले जाते. थोडक्यात आदिमानवाची ती माहिती तंत्रज्ञान केंद्र असावीत. ही सर्व चित्रे दिवसा सूर्यप्रकाशात सहजपणे दिसू शकतात. प्रकाशाकरिता कशाचाही वापर येथे करावा लागत नाही हे या गुहाचित्रांचे वैशिष्ठ्य आहे. गुहाचित्रातील सर्व चित्रे वन्यप्राण्यांची असून केवळ गिधाड या एकमेव पक्ष्यास येथे स्थान देण्यात आले आहे. एकाच रंगात सांबर-चितळाची चित्रे काढण्याचे काम वाखाणण्यासारखे आहे. यावरून त्या काळातील मानवाचे रंगज्ञान किती प्रगल्भ होते याची कल्पना येते.

भारतात अशा प्रकारची गुहाचित्रे मध्य प्रदेशातील भीमबेटका येथे आहेत. जगात फ्रान्स, आफ्रिका, ऑस्ट्रेलिया येथेही अशा प्रकारची गुहाचित्रे आहेत. या गुहाचित्रांच्या अभ्यासावरून असे लक्षात येते की पूर्वी भारत-ऑस्ट्रेलिया, दक्षिण अमेरिका आणि आफ्रिका हे तीनही देश एकाच खंडात होते. गोंडवाणा लँड म्हणून हा खंड ओळखला जात असे. कालांतराने भूगर्भातील हालचालींमुळे भारत चीनकडे सरकला. ऑस्ट्रेलिया, आफ्रिका हे देश वेगळे झाले. त्यामुळे तेथे राहणारा मानव व वन्यप्राणी यांची जणुकं एकच होती व त्यांची जगण्याची पद्धतीही सारखीच होती. त्यावेळचा आफ्रिकेतील आदिमानव रेतीवर वन्यप्राण्यांच्या बोटाने रेखाटन करून त्याची ओळख समूहातील सदस्यांना करून देत असे, अशी माहिती या गुहाचित्रांच्या अभ्यासकांनी दिली.

हिमयुगानंतर इंडोनेशियाच्या एका बेटावर विनाशकारी ज्वालामुखी जागृत झाला व त्याची कोट्यवधी टन राख आकाशात उडू लागली. वार्‍याच्या माध्यमातून ती जगभर पसरली. त्यात सूर्यही झाकोळला गेला. त्या राखेचे थर जमिनीवर व वनस्पतींवर साचले. त्यामुळे सर्वत्र दुष्काळ पडून तृणभक्षी व मांसभक्षी प्राणी त्यात बळी पडले. जगातील विविध प्राण्यांच्या, वनस्पतींच्या जाती नष्ट झाल्या. या नैसर्गिक आपत्तीतून बुशमन नावाचा आदिमानवाचा वंश दक्षिण आफ्रिकेतील कालाहारी येथे वाचला व नंतर तो जगभर पसरला.

आश्चर्याची बाब म्हणजे अशा प्रकारची गुहाचित्रे दक्षिण आफ्रिकेतही आढळून आली आहेत. कालप्रवाहात या वंशातील काही लोक उत्तर आफ्रिकेत स्थानांतरित झालेत. तेथून ते युरोपात पुढे उत्तर व दक्षिण अमेरिकेत गेले. त्यातीलच एक समूह भारतीय द्विपकल्पात स्थलांतरित होऊन पुढे ऑस्ट्रेलियात स्थानांतरीत झाला. ऑस्ट्रेलियात त्यांना अ‍ॅबॉरजीन्स म्हणून ओळखले जाते. विशेष म्हणजे तेथेही अशी गुहाचित्रे आढळून आली आहेत.

भारताचा विचार करता मध्य प्रदेशातील भोपाळजवळ नर्मदेच्या खोर्‍यात उत्तरेकडे भीमबेटका येथील विंध्य पर्वताच्या रांगांमध्ये अशा प्रकारची अश्मयुगीन गुहाचित्रे असून त्यावरून भारतातील मानवाच्या प्राचीन इतिहासाची ओळख होते. १९५७ मध्ये थोर पुराणवस्तू संशोधक डॉ. व्ही. एस. वाकणकर यांनी भीमबेटका येथे जवळपास ७८० गुहाचित्रे शोधली आहेत. पूर्व अश्मयुगाच्या आधीपासून पूर्व पाषाण ते मध्ययुगापर्यंतची ही चित्रे आहेत. पूर्व पाषाण युगातील चित्रांमध्ये मुख्यत्वे प्राण्यांची चित्रे असून त्यात रानगवे, अस्वल, रानकुत्रे व जिराफ यांची चित्रे आहेत. ही सर्व चित्रे लाल रंगात चितारली आहेत. मेसोलोथिक काळातील या चित्रांमध्ये मनुष्याच्या वेगवेगळ्या मुद्रेतील चित्रे आहेत. त्यात कुठे नृत्य करताना, कुठे शिकार करताना, तर कुठे लढाई करताना आहेत.

मुंगसादेव येथे सापडलेल्या सातपुडा पर्वत रांगातील गुहाचित्रे भीमबेटकाच्या आग्नेय (दक्षिण पूर्व) दिशेला आहेत. समुद्रसपाटीपासून ५५० मीटर उंचीवर तर २१.५ उत्तर व ७८ पूर्व या अक्षांश व रेखांशावर आहे. तेथील खडक मुख्यत्वे खारपापासून बनलेले आहेत. याचा अर्थ तेथे कधीकाळी समुद्र असावा. गुहाचित्रांचा आकार ३० मीटर रुंद व १० मीटर उंच व आतील भाग १० मीटरपर्यंत आत गेला आहे. माणसाचा हात पोहचेल एवढ्या उंचीवर ही चित्रे काढली आहेत. यात तृणभक्षी व मांसभक्षी प्राण्यांची चित्रे आहेत. गुहाचित्रांचे एकूण स्वरूप आर्ट गॅलरीसारखे आहे. प्रत्येक चित्राचा आकार १० ते १५ सेंमी असून ती प्रमाणबद्ध आहेत.

चित्रांमध्ये रानडुक्कर, रानगवा, निलगाय, माकड, गेंडा, जिराफ, रानकुत्रे, तरस, चितळे, बारसिंगा आणि सांबर इ. वन्यप्राण्यांचा समावेश आहे. रानकुत्र्यांचा कळप एकत्रपणे चितारला आहे. यावरून त्यांच्या जीवनशैलीचा परिचय होतो. जिराफ ऑफ्रिकेतले असले तरी हजारो वर्षांपूर्वी जिराफ सदृश्य प्राणी येथे अस्तित्वात होता असे चित्रांवरून वाटते. चित्ता, बिबट, गेंडा, सायल, सिंह हे आफ्रिकेत आणि भारतीय द्विपकल्पात सामान्यपणे आढळत होते. या चित्रांवरून हे स्पष्ट होते की त्या काळात हे प्राणी या भागात राहत होते. काळाच्या ओघात आणि बदललेल्या नैसर्गिक वातावरणात एकतर ते लुप्त झाले किंवा अन्यत्र स्थलांतरित झाले असावेत.

या परिसराचे सखोल निरीक्षण केले असता तेथे आणखी गुहाचित्रे असावीत. तेथे आदिमानव समूह-समूहाने गुहेत राहत असावा. समूहातील लहान व तरुणांना प्राण्यांची माहिती व्हावी म्हणून या गुहाचित्रांचा उपयोग माहितीचे संप्रेषण करण्यासाठी होत असेल. शिकार करण्यालायक प्राणी कोणते, धोकादायक कोणते, त्यांचे आकार, राहण्याचे ठिकाण, वागणुकीची माहिती इ. ज्ञान या गुहाचित्रांच्या माध्यमातून दिले जात असावे.

तापीच्या खोर्‍यात आतापर्यंत शोधलेल्या एकूण १८ गुहाचित्रांची चित्रशैली वन्यप्राण्यांचे प्रकार आणि भीमबेटका शैलाश्रयाचे सान्निध्य पाहता ही शैलाश्रयातील चित्रे पूर्व पाषाणयुगाच्या काळातील म्हणजेच १५ ते २० हजार वर्षांपूर्वीची असावीत, मात्र त्यांचा कालखंड निश्चित करण्यासाठी अधिक संशोधन होणे गरजेचे आहे. रेखाटलेल्या चित्रांवरून त्यामागील कार्यकारणभाव, प्राण्यांची माहिती समूहाला व्हावी आणि समूहातील प्रत्येकाने ती इतरांना द्यावी असा उद्देश असावा.

या चित्रांची आणि जगात अन्यत्र सापडलेल्या गुहाचित्रांची तुलना करता या काळात जे आदिमानवांचे स्थलांतर झाले त्यात कोठेतरी एकसमान दुवा आहे. त्या चित्रांचे नाजूक स्वरूप व त्यांचे ऐतिहासिकदृष्ठ्या महत्त्व पाहता त्यांना त्वरित संरक्षण मिळणे गरजेचे असल्याची भावना या अमरावतीच्या रिसर्च टीमने व्यक्त केली आहे. हा एक जागतिक वारसा आहे. भीमबेटका इतकीच ही गुहाचित्रेही महत्त्वाची आहेत. मानवी जीवनाची सुरुवातच विंध्य पर्वतात झाली. तो सुरुवातीला या पर्वतावर अशाच गुहेमध्ये समूहा-समूहाने राहत होता.

तेथून हा मानव पर्वता पर्वतावरून सातपुडा पर्वतावर आश्रयासाठी आला. आपण जगत असलेल्या जीवनशैलीचे टीपण त्याने चित्रभाषेत करून आपल्या येणार्‍या पिढीला त्याबाबत अवगत करण्याचा प्रयत्न केला असावा. मानवी अभिव्यक्तीचा हा सर्वात जुना ठेवा म्हणजे मानव उत्क्रांतीच्या अभ्यासकांसाठी एक पर्वणीच आहे. सुवर्ण महोत्सवी वर्षात पदार्पण केलेल्या महाराष्ट्रासाठी विदर्भातील या गुहाचित्रांचा शोध म्हणजे सुवर्ण महोत्सवी वर्षात लाभलेलं सोनेरी संचितच म्हणावे लागेल. विदर्भाच्या सांस्कृतिक कलेचा हा वारसा संपूर्ण जगाला साद घालतोय. विदर्भाच्या गर्भात लपलेल्या अलौकिकतेची गाथा सांगतोय.

-(लेखक शासनाच्या माहिती व जनसंपर्क महासंचालनालयात जिल्हा माहिती अधिकारी आहेत)

साताऱ्यात 2 लाख वर्षांपूर्वीच्या अश्मयुगीन मानवी संस्कृतीचा शोध
साताऱ्यातील अश्मयुगीन मानवी संस्कृती
फोटो स्रोत, Jayendra Joglekar

फोटो कॅप्शन, अतीत इथं नदी किनारी अश्मयुगीन काळातील दगडी हत्यारं सापडली.
Article Information
Author, मोहसीन मुल्ला
Role, बीबीसी मराठी प्रतिनिधी
10 नोव्हेंबर 2017
अपडेटेड 22 फेब्रुवारी 2018
सातारा जिल्ह्याला महाराष्ट्राच्या इतिहासात विशेष महत्त्व आहे. विशेषतः मध्ययुगीन महाराष्ट्र आणि मराठ्यांचा इतिहास यात सातारा जिल्ह्याला नेहमीच मोठे स्थान लाभलं आहे. याच साताऱ्यात किमान २-३ लाख वर्षांपूर्वीच्या आदिमानवाच्या अस्तित्वाच्या खाणाखुणा सापडल्या आहेत.

कृष्णा नदीच्या उगमानजीक आदिमानवाचं अस्तित्व नव्हतं, असाच आतापर्यंतचा समज होता. पण या संशोधनानं कृष्णा नदीच्या उगमानजीक आदिमानवाचं अस्तित्व होतं हे सिद्ध झालं आहे.

साताऱ्यातील उरमोडी नदीच्या पात्रालगत आणि इतर काही भागांत आद्य-पुराश्मयुगीन मानवी संस्कृतीचा शोध लागला आहे.

पुण्यातील डेक्कन कॉलेज पोस्ट ग्रॅज्युएट अॅंड रीसर्च इन्स्टिट्यूटमधील संशोधक यावर काम करत आहेत.

'नो मीन्स नो! मला रंग खेळायचा नाही, माझ्या मताचा आदर करा'
डार्क वेब : जिथं भाजीसारखं विकलं जातं कोकेन, हेरॉईन आणि एलएसडी
कृष्णा नदीच्या खोऱ्यातील प्लेइस्टोसिन काळातील मानवी संस्कृती शोध घेण्याचे प्रयत्न सातत्यानं सुरू आहेत. या प्रयत्नातील हा महत्त्वाचा टप्पा ठरला आहे.

संस्थेतील विद्यार्थी जयेंद्र जोगळेकर २०१४ पासून या विषयावर काम करत आहेत. डॉ. सुषमा देव, प्रा. एस. एन. राजगुरू यांच्या मार्गदर्शनाखाली हे काम सुरू आहे. उरमोडी नदीनजीक शहापूर, वेचळे, वळसे, माजगाव, अतीत, निसराळे आणि कृष्णा नदीजवळ मेणवली इथं या संस्कृतीचं अस्तित्व आढळलं आहे.

सातारा अश्मयुगीन संस्कृती
फोटो स्रोत, Jayendra Jogalekar

फोटो कॅप्शन, सापडलेल्या शस्त्रांत फरश्यांचा समावेश मोठ्याप्रमाणावर आहे.
संस्थेतील प्राचीन भारतीय संस्कृती, इतिहास आणि पुरातत्व विभागाच्या प्रमुख प्रा. सुषमा देव यांनी हे संशोधन महत्त्वाचं असल्याचं सांगितलं.

त्या म्हणाल्या, "कृष्णेच्या खोऱ्यातील अश्मयुगीन मानवाच्या अस्तित्वावर अनेक वर्षं संशोधन सुरू आहे. पण कृष्णेच्या उगमानजीक अश्मयुगीन मानवाचं अस्तित्व नव्हतं, असाच आतापर्यंत समज होता. तसंच, बेसाल्टचा दगड अश्मयुगीन काळात हत्यारं बनवण्यासाठी योग्य नाही, असा ही समज होता. हे दोन्ही समज या संशोधनानं खोडून काढले आहेत."

कृष्णा खोरे आणि पाषाणयुग
जयेंद्र जोगळेकर म्हणाले, १८६३ मध्ये रॉबर्ट ब्रूस फूट यांना पल्लावराम (तत्कालीन मद्रासजवळ) इथं काही दगडी हत्यारं सापडली, ज्यात 'हातकुऱ्हाड'चा समावेश होता. त्यानंतर भारताच्या इतर भागांमध्ये संशोधन सुरू झालं.

डॉ. एस. एन. राजगुरू, प्रा. सुषमा देव आणि जयेंद्र जोगळेकर
फोटो स्रोत, Jayendra Jogalekar

फोटो कॅप्शन, डावीकडून डॉ. एस. एन. राजगुरू, प्रा. सुषमा देव आणि जयेंद्र जोगळेकर या प्रकल्पावर काम करत आहेत.
परंतु डेक्कन ट्रॅप (बेसाल्ट) दगड असलेल्या भागांमध्ये अश्मयुगीन हत्यारं मिळत नव्हती. घनदाट जंगल आणि डोंगराळभागामुळे या अडचणी येत असाव्यात. त्यामुळे असा समज निर्माण झाला होता की अश्मयुगीन मानव या भागामध्ये वास्तव्यास नव्हता.

योगायोगानं १९५२ मध्ये गंगावाडी येथे (गंगापूर जवळ) मातीच्या धरणाच्या बांधकामासाठी खोल खड्डे घेतले जात असताना त्यामध्ये काही मानव निर्मित अश्मयुगीन दगडी हत्यारे आढळून आली.

प्रोफेसर ह. धि. संकलिया यांनी त्या हत्यारांचा अभ्यास केला. त्यानंतर डेक्कन ट्रॅप भागामध्ये संशोधन केलं असता कऱ्हा, घोड, भीमा यासारख्या नदी आणि परिसरांमध्ये सुद्धा अनेक साईट्स सापडल्या.

पुढे डॉ. आर. एस. पप्पू यांनी कर्नाटकातील अनगवाडी आणि परिसरात मोठ्याप्रमाणावर पाषाणयुगातील साईट्स शोधल्या होत्या.

प्रतिनिधीक चित्र
फोटो स्रोत, nevio3/Getty Images

फोटो कॅप्शन, प्रतिनिधीक चित्र
तर १९८६ला काळे व त्यांच्या सहकाऱ्यांना कर्नाटकातील येडूरवाडी येथे विविध विलुप्त प्राण्यांच्या प्रजातींचे जीवाश्म आणि कॅल्शियम कार्बोनेटचे आवरण असलेले झाडांचे बुंधे आणि १०० च्या आसपास पाषाण युगातील हत्यारे सापडली होती.

या साईटचे कालमापन केले तेव्हा ते ३.५ लाख वर्षांहून अधिक जुने आहे, असे लक्षात आले.

GDP मध्ये चीनला मागे टाकत भारताचं एक पाऊल पुढे
#RealityCheck | पाकिस्तानने खरंच चिनी भाषेला अधिकृत दर्जा दिलाय का?
२००८ मध्ये डेक्कन कॉलेज पोस्ट ग्रॅज्युएट अॅंड रीसर्च इन्स्टिट्यूटमधील संशोधक चारुता कुलकर्णी आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी कृष्णा खोऱ्यातील (वाई परिसरातील) या मानवी संस्कृती आणि पर्यावरण या वर रिसर्च पेपर लिहिला होता.

नव्या संशोधनाचं महत्त्व
जयेंद्र जोगळेकर म्हणाले, या गावांतून मोठ्याप्रमाणावर दगडी हत्यारं शोधता आली आहेत. ही संख्या ३०० पेक्षा जास्त आहे.

एवढ्या मोठ्या प्रमाणात डेक्कन ट्रॅप (बेसाल्ट) भागातील कृष्णा खोऱ्यातून या पाषाणयुगातील दगडी हत्यारं मिळण्याची ही पहिलीच वेळ असल्याचं त्यांनी सांगितलं.

दगडी हत्यारे
फोटो स्रोत, Jayendra Jogalekar

फोटो कॅप्शन, या संशोधनात मोठ्या प्रमाणावर दगडी हत्यारं शोधता आली आहेत.
छिलका हत्यारांचा समावेश असलेल्या या परंपरेला अॅश्युलियन संबोधले जाते. अॅश्युलियन संस्कृतीमध्ये (लार्ज फ्लेक अॅश्युलियन) १० सेंटीमीटरपेक्षा मोठ्या छिलक्यांपासून हत्यारं तयार करत असत.

बेसाल्ट दगड लवकर झिजतो, त्यामुळे कृष्णा खोऱ्यात या युगातील हत्यारं जास्त प्रमाणात मिळणं कठीण असतं. पण यावेळी ही मिळाली असल्याचं, ते म्हणाले.

नदीचा प्रवाह हा सध्या आहे तेथूनच लाखो वर्षे वाहत असल्याचंही या या अभ्यासातून दिसते.

या संशोधनाचं महत्त्व
मोठ्या छिलक्यांपासून बनवलेल्या या हत्यारांमध्ये फरश्या (Cleavers) व तासण्या (Scrapers) यांची संख्या जास्त आहे. त्यातही फरश्याचं प्रमाणात जास्त आहे.

सातारा अश्मयुगीन संस्कृती
फोटो स्रोत, Jayendra Jogalekar

त्याकाळात पाऊस जास्त होत असावा, त्यामुळे वनस्पतींची वाढ ही मोठी होत असणार. त्या वनस्पती तोडण्यासाठी, त्यांची साल काढण्यासाठी फरश्यांचा वापर करावा लागत असणार.

याशिवाय, छोट्या प्राण्यांची शिकार करण्यासाठी उपयुक्त ठरेल, अशा हत्यारांचा वापर होत असावा.

जयेंद्र जोगळेकर म्हणाले, 'त्याकाळात मोठी शिकार होत नसावी. इतर हिंस्र प्राण्यांनी केलेल्या मोठ्या शिकारींचा शिल्लक राहिलेला भाग मानवाला अन्न म्हणून उपयोगी पडत असे. त्यातही ही हत्यारं उपयुक्त ठरत असावीत.'

लोकसंख्या जास्त
या भागातून मिळालेल्या पाषाणांच्या या हत्यारांची चांगली संख्या लक्षात घेतली, तर या परिसरात त्या युगात मानवाची जास्त लोकसंख्या होती, असा निष्कर्ष काढता येतो, असंही जोगळेकर यांनी स्पष्ट केलं.

या संशोधनाचे रीसर्च पेपर Indian Society for Prehistoric and Quaternary Studies च्या Man and Environment आणि Heritage: Journal of Multidisciplinary Studies in Archaeology या नियतकालीकांमध्ये प्रसिद्ध झाले आहेत.

discovermh.com
खानदेशातील अश्मयुगीन स्थळे | Discover Maharashtra
Discover Maharashtra
11–14 minutes
खानदेशातील अश्मयुगीन स्थळे –
पुरातत्त्वशास्त्र म्हणजे प्राचीन मानवी समाजाचे अध्ययन आहे. ते करण्यासाठी प्राचीन लोकांनी मागे सोडलेल्या अवशेषांचा शोध घेऊन व त्यांचे सखोल निरीक्षण करावे लागते. निरीक्षणातून मिळालेल्या माहितीचे विश्लेषण करतात. त्यासाठी त्या जुन्या कालखंडातील हवामान, भौगोलिक परिस्थिती, ज्ञात इतिहास आणि एकूणच तत्कालीन पर्यावरण विचारात घेतात. यांत अनेक गोष्टींचा अंतर्भाव असल्यामुळे, हे शास्त्र विज्ञान व मानवशास्त्र अशा दोन्ही विभागांत समजले जाऊ शकते. प्राचीन भारतीय इतिहासाची पुरावे हे पुरातत्त्व अभ्यासाच्या आधारे मिळालेले आहेत ज्या प्रमाणे सिंधू संस्कृती हडप्पाकालीन स्थळे या सर्व घटकांचा अभ्यास पुरातत्त्व शास्त्राच्या माध्यमातून केला गेलेला आहे.लाखो वर्षांपूर्वीचे मानवी जीवन समजून घेण्यासाठी पुरातत्व हे एकमेव शास्र आहे. पुरातत्त्वशास्त्र हे मानव जातीचा इतिहास शोधते. सुमारे २.५ लाख वर्षांपूर्वी आफ्रिकेत मानवाने प्रथमतः तयार केलेल्या दगडी हत्यारापासून ते नजीकच्या काही दशकांपर्यंतच्या काळाचा अभ्यास या विषयात येतो..त्याकाळचा अभास करण्यास इतिहासकारांना काहीच साधन लिखित स्वरूपात उपलब्ध नसते. हा काळ म्हणजे मानवी इतिहासाच्या एकूण काळापैकी सुमारे ९९ % काळ आहे. म्हणज्र प्रागैतिहासिक ते साक्षरतेचा प्रसार होईपर्यंतचा काळ.(खानदेशातील अश्मयुगीन स्थळे)

पुरातत्त्वशास्त्राचा उद्देश मानवी उत्क्रांतीपासून ते सांस्कृतिक उत्क्रांतीपर्यंतचा सांस्कृतिक इतिहास जाणून घेणे हा आहे. पुरातत्त्वशास्त्रात खालील गोष्टींचा अंतर्भाव होतो. निरीक्षण व सर्वेक्षण, उत्खनन आणि मिळालेल्या माहितीच्या आधारे उत्खननानंतरचे विश्लेषण. यानंतर पुरातन काळाची अधिक माहिती मिळू शकते. व्यापक अर्थाने, पुरातत्त्वशास्त्र हे परस्परावलंबी शाखांतील शोधांवर अवलंबून आहे. त्या शाखा म्हणजे इतिहास, कलेचा इतिहास, वैज्ञानिकशास्त्रे, भूगर्भशास्त्र, तसेच भाषाशास्त्र, भौतिकशास्त्र, माहितीविज्ञान, रसायनशास्त्र, संख्याशास्त्र, जीवशास्त्राच्या इतरशाखा पुरापर्यावरणशास्त्र(paleoecology), पुराप्राणिशास्त्र (paleozoology), paleoethnobotany,व पुराजीवशास्त्र (paleobotany) प्रागैतिहासिक काळापासून मानवी इतिहास उभा करण्यासाठी विसाव्या शतकात पुरात्विय संशोधनात तंत्र आणि व्याप्ती यात बरेच बदल झाले.

उत्खननाची शास्त्रशुध्द  पध्दत विकसित होत गेली. इतिहास म्हणजे केवळ कलात्मक वस्तू आणि वास्तू किंवा विशिष्ट मानवी वंशाचा, वर्गाचा अथवा प्रदेशाचा अभ्यास करण्याचे ध्येय न रहाता विशाल मानवी समाजाच्या संपूर्ण अस्तित्व, विकास आणि विकासाला, अधोगतीला कारणीभूत ठरलेल्या सर्व पुराव्यांचा अभ्यास करणे हे ध्येय पुरातत्व शास्राने पुढे नेल्याने या शास्त्राच्या कक्षा  संबंध मानवी समाजाच्या इतिहासाशी एकरूप झाल्या आहेत असे प्रतिपादन पुरातत्व विद्या या पुस्तकात शां.बा.देव यांनी केले आहे. प्राचीन मानवी जीवन कसे होते?  इतिहास प्रामुख्याने राजकीय घटना आणि घडामोडी यांवर जोर देतो पण सर्वसामान्य माणसाचे जीवन कसे होते? याचा आढावा लिखीत इतिहास घेत नाही तशी साधने उपलब्ध नाहीत म्हणून पुरातत्व शास्त्रांच्या आधारे त्याने मागे ठेवलेल्या वस्तूंच्या आधारे समजून घेण्यासाठी मार्ग म्हणजे पुरातत्व होय.सर मॉर्टीमर व्हिलरच्या मते तर पुरातत्त्वीय पुराव्यांवरून मानवी मनाचा वेध घेता येतो. आणि तो कसा घ्यायचा हे पुरात्वज्ञांचे काम आहे. म्हणून पुरातत्वज्ञ केवळ वस्तूरूप पुरावा खणून काढतो असे नाही तर मानवी समाजाचे व्यक्तिमत्त्व खणून काढतो.

मानवी इतिहासाचे अभ्यासकांनी सोयीसाठी तीन कालखंड कल्पिलेले आहे. १.प्रागइतिहास, २. इतिहासपुर्व काळ, ३.इतिहासकाळ होय. एवढ्या मोठ्या कालखंड उभा करणे हे एक आव्हान आहे. त्यामुळे नवनवीन गोष्टी समोर येत जातात तशतशी आधीचे सिध्दांत आणि गृहितके बदलावी लागतात. यात अजून एक महत्वाचे ठरते ते म्हणजे भौगोलिक घटना आणि त्यांचे परिणाम याचाही अभ्यास केला जातो कारण मानवी जीवन हे पर्यावरणाचे अभिन्न अंग आहे. नविन येणारे तंत्र आणि तंत्रज्ञान हे सुद्धा मानवी जिवनात अमुलाग्र बदल घडवत असतात. जसे की पाषाणयुगात दगडी शस्रे वापरून शिकार करणारा माणूस शेती करायला लागल्यापासून स्थिरावला भटके आयुष्य संपले. पशुपालक झाल्यावर अन्नाची चणचण संपली आणि इतर बाबतीत विचार करू लागला. संस्कृती म्हणजे जगण्याची रीत आणि ही रीत सतत बदलती असते कारण मानवी विकास हा सुद्धा वाहता ओघ असतो.चाकाचा शोध,धातूचा शोध अशी हजारो उदाहरणे देता येतील.

मानवी संस्कृतीच्या वेध घ्यायला पुरातत्त्वीय अवशेष व्यतिरिक्त इतर शाखांची मदत घ्यावी लागते. मानववंशशास्त्र, भाषाशास्र होय. साहित्य, परंपरा हळूहळू इतर शास्त्र जोडली गेली कारण प्रत्येक शास्त्र मानवी जीवनाचा अभिन्न अंग आहे.जगभरात असे संशोधन होते आहे आणि विविध संस्कृती त्यांच्या विशेष स्वरूपात समोर येत आहे. त्यांचा तुलनात्मक अभ्यास होतो आहे आणि मानवी विकासाचे टप्पे वेगवेगळ्या भौगोलिक परिस्थिती आणि इतर घटकांवरून समोर येत आहे. चीन, इजिप्त जपान,इराण इराक पाकिस्तान आणि अफगाणिस्तान ही यादी बरीच लांबलचक आहे कारण मानवी उत्क्रांतीच्या प्रक्रिया जाणून घ्यायची उत्सुकता आहे. भारतात अशी उत्खनने आणि अभ्यास होत आहे. मोहेंजोदडो हडप्पा व्यतिरिक्त अनेक स्थळे सापडली त्यावरून पहिला नागरीकरण, त्याचा ऱ्हास, दुसरे नागरीकीकरण आणि त्याचा  ऱ्हासाची कारणे यांची मिमांसा तुलना होते आहे. या पुरातत्विय स्थळांची तुलना आंतरभारतीय तसेच जगातील इतर संस्कृतीशी होत आहे. या पार्श्वभूमीवर खानदेशातील पुरातत्त्वीय स्थळे काय सा़ंगतात त्याचा आढावा घेण्याचा प्रयत्न आहे.

खानदेशातील हवामान भौगोलिक परिस्थिती यांचा विचार केला तर पर्वतीय रांगा, तापीपुर्णा पांझरा, गिरणा इत्यादी नद्या आणि त्यांच्या उपनद्या यामुळे हा भुभाग समृध्द होता. नदीकाठच्या बाजूला मानवी वसाहती आणि संस्कृती बहरते. महाराष्ट्रातील इतर पुरातत्त्वीय स्थळांशी  तुलना केली तर गोदावरी, कृष्णा नदीच्या खोऱ्यात असलेल्या लोकवस्तीच्या तुलनेत तापी नदीच्या खोऱ्यात असलेल्या लोकवस्तीच्या संख्या तसेच लोकसंख्या जास्त असल्याचे ढवळीकर आणि वसंत शिंदे यांच्या अभ्यासातून निष्पन्न झाले आहे. खानदेशात सापडलेल्या स्थळांपैकी काही अश्मयुगीत बऱ्यापैकी ताम्रपाषाणयुगीन स्थळे आहेत. संस्कृतंचा सविस्तर चर्चा केली तर पहिली संस्कृती सावळदा जे प्रकाशेच्या विरूध्द किनाऱ्यावर आहे. प्रकाशेला जेव्हा उत्खनन झाले त्याच काळात येथे एम.ए. साळी यांनी उत्खनन केले. ताम्रपाषाणयुगीन दक्षिण भारतात प्रातिनिधिक असे हे स्थळ आहे म्हणून सावळदा संस्कृती असे नाव दिले. गुजरात मधील संबंध अधोरेखित करणारी रंगपूर या पुर्वहडप्पन स्थळाशी संबंध खापरे आणि मातीच्या भांड्यावरून समजतो. पशुपालक तसेच शेती अशी ही संस्कृती आहे.

दुसरी उत्तर हडप्पा संस्कृती महाराष्ट्रातील दायमाबाद हे उत्तम उदाहरण आहे. मातीचे शिक्के, हडप्पा लिपी असलेले शिक्के, ब्रांझचे साठे इत्यादि गोष्टी लक्षात येतात यावरून उत्तरेकडील संस्कृती शी देवाणघेवाण होती हे लक्षात येते. तापीच्या खोऱ्यात गुजरात, मध्यप्रदेशातील स्थळे ही या संस्कृतीची उदाहरणे आहेत. माळवा संस्कृती महाराष्ट्रातील स्थिरावलेले शेतकरी दिसतात. यांत दायमाबाद, इनामगाव, कायथा, नागद, विदिशा, ऐरण, नावडाटोली ही उदाहरणे आहेत. या संस्कृतीची विशेषतः आहे ती म्हणजे चुली, तंदुर, धान्य साठविण्यासाठी कोठारे सुबकपातळ भांडी लालकाळी वर काळ्या रंगाच्या चित्र काढलेली धान्ये गहू, हरभरा, बार्ली तर प्राण्यांच्या अवशेषात गाईगुरे, शेळ्यामेंढ्या तसेच दागदागिने, मणी, शंखशिंपले आणि त्यांच्या बांगड्या गुजरात किनाऱ्याशी संबंध दिसतो. धार्मिक जीवन दिसते मातीचे बैल, वृक्षपुजा,आहुतीच्या जागा मातृकांच्या मृणमुर्ती इत्यादि  खूप सखोल अभ्यास केला गेल्यामुळे विशेषतः दायमाबाद आणि इनामगाव या स्थळांचा त्यामुळे संपूर्ण मानवी जिवनाचा पट मांडता आला. जोर्वे संस्कृती मोठी खेडी ही संकल्पना विकसित झालेली दिसते ‌ तांत्रिक प्रगती झालेली दिसते. या संस्कृतीची ओळख करून घेतली कारण खानदेशातील उत्खनन स्थळांवर या तिन्ही संस्कृतीचे थर दिसतात.(खानदेशातील अश्मयुगीन स्थळे)

महाराष्ट्रातील दोनशे पुरातत्त्वीय स्थळांपैकी शंभर स्थळे तापीच्या खोऱ्यातील आहे. या खोऱ्याची वैशिष्ट्यपूर्ण रचना दक्षिण आणि उत्तर भारत यांच्यामधील स्थान तसेच शेतीसाठी उपयुक्त व योग्य हवामान यामुळे महाराष्ट्रातील आद्य शेतकरी तापी खोऱ्यात उदयास आला. ताम्रपाषाणयुगीन समाज रचनेची आणि संस्कृती यांची माहिती कावठे गावी झालेल्या उत्खननातून सन १९८४ मधील आद्य शेतकऱ्यांच्या जीवनावर प्रकाश पडतो. सुमारे एक लाख वर्षांपूर्वी अश्मयुगीन काळात खानदेशात मानवी वस्तीचे पुरावे साळी यांनी केलेल्या धुळे जिल्ह्यातील साक्री येथील भाडणे गावात केलेल्या उत्खननात दिसून आले आहेत. भाडणे येथील उत्खननात अश्मयुगीन हत्यारे  सापडलेली आहेत. अशीच उत्खनने किरवाडे, भोनगाव, भाडणे, भामेर, साक्री, दातरती, ढवळी विहिरपाडा इत्यादि ठिकाणी झाली आहेत. यांचा काळ सुमारे इ.स.पुर्व एक लाख ते तीस हजार वर्ष एवढा आहे.

उत्तर अश्मयुगीन स्थळे –
कासारे, गणेशपूर, खोरी, घोडदे, छडवेल,  टिटाणे, नवडणे, मालपूर, म्हसदी, वसमार, शेणपूर, शेवगे ही आहेत. उत्तर पुराश्मयुगीन स्थळे इ.स.पूर्व तीस हजार ते दहा हजार वर्ष एवढा मोठा आहे. आष्ठाणे, आमखेल, इंदवे, धनेर, नवडणे, ब्राम्हणवेल, वासखेडी इत्यादि होय.

ताम्रपाषाणयुगीन स्थळे –
इ. स. पुर्व २५०० ते एक हजार वर्षे चि़ंचखेडे, चिकसे, छडवेल, जैताणे, दुसाणे, भाडणे, नाडसे, रूणबली, साक्री इत्यादि होय. नामशेष झालेल्या प्राण्यांच्या अश्मीभूत अस्थी दहिवेल आणि दाभलपाडा येथे मिळाल्या आहेत. साक्रीपासून चार किलोमीटर अंतरावर पश्र्चिमेला कवठे हे गाव आहे. १९५८ मध्ये डॉ वसंत शिंदे यांनी उत्खनन करून महाराष्ट्रातील शेतकरी साडेचार हजार वर्षांपूर्वी येथे रहात होते हे सिद्ध केले.येथील उत्खननात ताम्रपाषाणयुगीन संस्कृतीची वसाहत सापडली आहे आणि त्यावरून खानदेश तसेच परत एकदा १८८४ मधील उत्खननातून प्रकाश पडला. येथली मृद्भभांडी ही इसवीसन पूर्व पाचशे ते पहिल्या शतकातील आहे. लाल दणकट भांडी, सावळदा संस्कृतीची भांडी, तपकिरी रंगाची गुळगुळीत भांडी, लाल राखी रंगाची भांडीजाड, तांबडी रंगाची भांडी या सर्व भांड्यावरून मानव पशुपालन करत होता हे समजते. उत्खननात विविध हत्यारे, शंखशिंपले, मणी मिळाले आहेत. हरप्पन संस्कृतीशी संबंध होता हे मण्यावरून कळते. दफन पध्दतीत शरीर उणाणे तर लहान मुलांना लांब आकाराच्या खड्ड्यात वाकलेल्या स्थितीत पुरत अनेक प्राण्यांच्या हाडांवरून उदरनिर्वाह करण्यासाठी विविध प्राण्यांवर अवलंबून होते हे दिसते.

प्रकाशे येथील उत्खननात  ताम्रपाषाणयुगापासून तर मध्ययुगीन पुरावे सापडले आहेत. यांत उत्तर सिंधु, माळवा, जोरवे संस्कृतींचे अवशेष दिसतात. हत्यारे, पाती, चाकु, शिंपले, मातीच्या असंख्य वस्तू दिसतात. सातवाहन काळातील जीवन समजून घेण्यासाठी प्रकाशे येथील उत्खननात सापडलेल्या वस्तू उपयोगी आहे. इथल्या लोकवस्तीचा कालखंड इ. सन पूर्व १७०० ते इसवीसनाच्या तेराशे पर्यत आहे नंतर ते एक तिर्थक्षेत्र उदयास आलेले दिसते.

महाराष्ट्र-एक पुरातत्त्वीय समालोचन या पुस्तकातील यादीच्या आधारे खानदेशात (धुळे, नंदुरबार) जिल्ह्यातील ३०-४० हजार वर्षांपासून गावांनी अतिप्राचीन वैभवशाली इतिहास आपल्या उदरात साठवून ठेवला आहे. (इंडियन अर्किऑलॉजी-ए-रिव्हियू 1953 ते 54)  तापी खोऱ्यात महाराष्ट्रातील पहिल्या शेतकरी वसाहतीचा उत्खननीय पुराव्यावरून शोध लागला. खानदेशवासीयांच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण गोष्ट म्हणजे सावळदा (शिरपुरा-धुळे मार्गावर) येथे उत्तर हरप्पन काळात संस्कृती विकसित झाली ती सावळदा संस्कृती म्हणूनच (इ. स. पूर्व २२००-१८०० ते ) उदयास आली. खानदेशात एका स्वतंत्र संस्कृतीचा त्याकाळात उदय झाला. असा ऐतिहासिक वारसा अतिप्राचीन काळापासून धुळे व नंदुरबार भागास लाभला आहे. उत्तर हरप्पन संस्कृती  ५ ते ४ हजार वर्षांपूर्वी येथेच विकसित झाली. त्या पुरातत्त्वीय संस्कृतीचे अवशेष कावठे (साक्री) येथील उत्खननात मिळाले.

खानदेशात २०० च्या वर प्राचीन संस्कृतीची स्थाने पुरातत्त्वीय संशोधकांना मिळाल्यास  १०० च्या वर स्थाने धुळे जिल्ह्यात मिळाल्या. इ. स. पूर्व १४०० ते १००० जार्वे संस्कृतीकालीन अवशेष (अक्कलपाडा) चिंचखेडा येथे मातीची भांडी, खापरे व तांब्याचा भाला सापडला. यावरून येथे समृद्ध संस्कृती नांदत होती. नासा येथील अभ्यासक डॉ. पियानो यांच्या अभ्यासावरून खान्देशचा (धुळे जिल्ह्याचा) भूभाग भौगोलिक स्थित्यंतरानुसार ६६ लाख वर्षांपूर्वी तयार झाला. पांझरा नदी ही १० लाख वर्षांपूर्वी शेंदवडच्या डोंगरातून उगम पावली. धुळे जिल्ह्यास पांझरा, कान या नद्यांवर बंधारे बांधून त्या पाण्यावर अभिनव जलसिंचन व्यवस्था प्राचीन काळापासून आजतागायत सुरू आहे. प्रकाशा, कावठे येथील उत्खननात सापडलेल्या वस्तू, अलंकार, मणी, भांडी वैभवाची साक्ष देतात. लोकसंस्कृतीची, गणराज्याची समृद्ध संपभूमी होती. इ. स. पूर्व काळात मौर्यांनी येथे सत्ता स्थापली. इ. स. पूर्व २३० च्या सुमारास सातवाहनांचे वर्चस्व निर्माण झाले. महत्त्वाचे व्यापारी मार्ग (सार्थवाहपथ) याच जिल्ह्यातून गेल्याने व्यापारी महत्त्व वाढले. सुरत-बऱ्हाणपूर सुरत-नागपूर, नागपूर-आगा इत्यादी मार्ग. इ.स. २४० ते ४१९  पर्यंत अभिरांनी या प्रदेशावर राज्य केले. खान्देश प्राचीन काळापासून अभिरांची म्हणजे अहिरांची भूमी म्हणून ओळखली जाते. पुढच्या काळाचा आढावा घेण्यासाठी खानदेशात आणि त्यांच्या परिसरात, सीमांवर असलेल्या बौध्द लेणींचा आढावा घेऊ या.खानदेशातील अश्मयुगीन स्थळे.

loksatta.com
आदिमानवाच्या काळातही ‘मुंबई’ शहरात होते कारखाने! काय आहे मुंबई अन् अश्मयुगाचा संबंध जाणून घ्या
धनिष्ठा दातार
~2 minutes
Premium

संग्रहित लेख, दिनांक 13th May 2024 रोजी प्रकाशित

आदिमानवाच्या काळातही ‘मुंबई’ शहरात होते कारखाने! काय आहे मुंबई अन् अश्मयुगाचा संबंध जाणून घ्या
मुंबई शहर हे अश्मयुगीन काळातदेखील कारखाने आणि फॅक्ट्री साईटसाठी वापरात असल्याची अतिशय रंजक माहिती आज आपण पाहणार आहोत. मुंबईतील कोणत्या भागात आदिमानवाचे वास्तव्य होते पाहा.
Updated: May 16, 2024 18:54 IST

Mumbai city and stone age connection
मुंबई आणि अश्मयुग यांच्यातील संबंध पाहा. [Photo credit - YouTube]
मानवाच्या उत्क्रांतीचा इतिहास म्हटला की अर्थातच आदिमानव ते सध्याचा प्रगत मानव इथपर्यंतचा संपूर्ण प्रवास, प्रवासादरम्यान मानवाने स्वतःच्या संरक्षणासाठी, पोटापाण्यासाठी कोणकोणते शोध लावले हे पाहणे फार महत्त्वाचे असते. हे केवळ महत्त्वाचे नसून, अतिशय रंजक असे आहे. मानवाच्या उत्क्रांतीचे तीन महत्त्वाचे टप्पे, कालखंड म्हणजे अश्म्युग, ताम्रयुग आणि लोहयुग. सर्वात पहिले युग म्हणजे अश्मयुग.

आदिमानवाच्या काळातही मुंबई शहरात होते कारखाने! काय आहे मुंबई अन् अश्मयुगाचा संबंध जाणून घ्या

  मुंबई शहर हे अश्मयुगीन काळातदेखील कारखाने आणि फॅक्ट्री साईटसाठी वापरात असल्याची अतिशय रंजक माहिती आज आपण पाहणार आहोत. मुंबईतील कोणत्या भागात आदिमानवाचे वास्तव्य होते पाहा
    मानवाच्या उत्क्रांतीचा इतिहास म्हटला की अर्थातच आदिमानव ते सध्याचा प्रगत मानव इथपर्यंतचा संपूर्ण प्रवास, प्रवासादरम्यान मानवाने स्वतःच्या संरक्षणासाठी, पोटापाण्यासाठी कोणकोणते शोध लावले हे पाहणे फार महत्त्वाचे असते. हे केवळ महत्त्वाचे नसून, अतिशय रंजक असे आहे. मानवाच्या उत्क्रांतीचे तीन महत्त्वाचे टप्पे, कालखंड म्हणजे अश्म्युग, ताम्रयुग आणि लोहयुग. सर्वात पहिले युग म्हणजे अश्मयुग ! नावाप्रमाणेच अश्मयुगात मानव / आदिमानव हा स्वतःच्या रक्षणासाठी दगडांपासून हत्यारे, अवजारे, त्या काळातील जीवनोपयोगी वस्तू तयार करत असे; असे आपण अगदी लहानपणापासून शाळेत शिकत आलो आहोत. मात्र, त्या काळातदेखील  मुंबई शहरात, या आदिमानवाचे हत्यार बनवण्याचे  कारखाने थाटले असल्याची रंजक माहिती तुम्हाला माहीत आहे का? चला मग, आज आपण या दोघांमधील संबंधाची माहिती जाणून घेऊ.

  मुंबई शहरात गोराई भागात असणाऱ्या मनौरी किनाऱ्यालगत आदिमानव आणि त्यांच्या दगडी अवजारांचे काही अवशेष / पुरावे २०१७ साली काही पुरातत्वीय शास्त्रज्ञांना सापडले असल्याची माहिती गोष्ट मुंबईची या यूट्यूब मालिकेतून आपल्याला समजते. मुंबई विद्यापीठाच्या बहिःशाल शिक्षण विभागाच्या अंतर्गत येणारे सेंटर फॉर आर्किओलॉजी, साठ्ये महाविद्यालय आणि इंडिया स्टडी सेंटर हे मुंबईच्या संशोधन प्रकल्पावर काम करत होते. यासाठी त्यांना भारतीय पुरातत्त्व खात्याने [ASI] देखील परवानगी दिली होती. तेव्हा २०१७ साली याच मनौरी किनाऱ्याजवळ अश्म हत्यारांचे पुरावे सापडल्याचे समजते.
   सुरुवातीला एक, दोन हत्यारे सापडता-सापडता संशोधकांना अनेक दगडी हत्यारे या ठिकाणी सापडली. त्यामुळे मुंबईतील या भागात त्या अश्मयुगीनकाळी आदिमानवांची हत्यारांची फॅक्टरी असल्याचा अंदाज लावला होता. जेव्हा एखाद्या वस्तूची सर्वाधिक गरज निर्माण होते, तेव्हा ती वस्तू मोठ्या प्रमाणावर तयार केली जाते आणि अशा ठिकाणालाच आपण फॅक्टरी असे म्हणू शकतो. मात्र, कोणतेही प्रगत तंत्रज्ञान नसताना, अश्मयुगीन काळात आदिमानव हत्यार आणि शस्त्रे कशी बनवत असतील?

 अश्मयुगीन मानव हत्यारे कशी बनवत होते?
    तर त्याकाळातील मानव, गोल आकाराच्या आणि विशिष्ट पकड असणाऱ्या दगडाचा वापर करत असे. या दगडांना हॅमर स्टोन  असे म्हटले जाते. या बेसॉल्टिक हॅमर स्टोनचा वापर, मोठे दगड फोडून, त्यांमधून हत्यारे बनवण्यासाठी केला जात असे. मात्र, हे दगड फोडण्यासाठीदेखील एक विशिष्ट पद्धत आहे. जो दगड फोडायचा आहे, त्यावर हॅमर स्टोनने ४५ अंशाच्या कोनामध्ये प्रहार केले जातात. असे केल्याने दगड फोडला जातो. आता त्यांना योग्य आकार देण्यासाठी, लहान आकाराच्या हॅमर स्टोनचा उपयोग केला जातो. अशा पद्धतींचा अभ्यास करून, संशोधकांना तयार झालेली हत्यारे मानवनिर्मित आहेत की नाही हे समजण्यास मदत होते. तसेच ते कसे तयार केले गेले आहेत तेसुद्धा त्यांना समजते.
  असे हे हॅमर स्टोन, हत्यारे बनवण्याची अवजारे मनौरीच्या वनडोंगरी भागात भरपूर प्रमाणात सापडत असल्याने संशोधक या जागेला अश्मयुगातील फॅक्टरी साईट म्हणतात. तोसाबंता पधान [Tosabanta Padhan] या पुरातत्त्व शास्त्रज्ञाचा अभ्यासाचा मुख्य विषय हा अश्मयुगीन हत्यारे असा होता. त्यांच्या मार्गदर्शनाखाली या मनौरी भागात हे प्रायोगिक उत्खनन करण्यात आले होते. तेव्हा तिथे सापडलेली हत्यारे लॅबमध्ये नेऊन त्यावर अभ्यास केल्यावर असे समजले की, मुंबईतील मनौरी भागात सापडलेली ही हत्यारे
   मध्याश्म युगातील होती. म्हणजे साधारणतः १७ हजार वर्षे जुनी.
    याव्यतिरिक्त एकोणीसशेच्या काळात, कर्नल टोड यांनीदेखील या हत्यारांचा शोध घेतला होता. तेव्हा त्यांना मनौरी, मढ, गोराई यांसारख्या ठिकाणी अश्म हत्यारांचे अवशेष सापडले होते. हत्यारं आणि शस्त्रांव्यतिरिक्त चौथ्या आणि पाचव्या शतकातील रोमन साम्राज्यातील वाईन साठवण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या मातीच्या भांड्यांचे अवशेषदेखील याच मनौरीमध्ये सापडले आहेत.
https://www.etvbharat.com/mr/!state/footprints-of-stone-age-history-rare-rock-paintings-found-in-chandrapur-district-maharashtra-news-mhs25052800467
अश्मयुगीन इतिहासाच्या पाऊलखुणा; चंद्रपूर जिल्ह्यात आढळले दुर्मीळ खडकचित्र - ROCK PAINTING CHANDRAPUR
जिल्ह्यातील गोंडपिपरी तालुक्यातील वढोली गावात, उंच खडकांवर प्राचीन खडकचित्र आढळली आहेत. इतिहास अभ्यासक अरुण झगडकर यांच्या संशोधनानुसार या खडक चित्रांची संख्या ६० ते ७० आहे.
ROCK PAINTING CHANDRAPUR
अश्मयुगीन इतिहासाच्या पाऊलखुणा (ETV Bharat Reporter)

चंद्रपूर : चंद्रपूर जिल्ह्याला मोठा ऐतिहासिक वारसा लाभला आहे. प्राचीन काळातील अनेक पाऊलखुणा इथं आढळून येतात. त्यात आणखी भर पडली आहे, ती अश्मयुगीन खडकचित्रांची. गोंडपिपरी तालुक्यातील वढोली या गावाजवळ अशी तब्बल ६० ते ७० कोरीव खडकचित्रं (Petroglyphs) आढळली आहेत. महापाषाण युगात येथील भूभागावर मानव टोळ्या करून वास्तव्य करीत होते हे या संशोधनातून समोर आले आहे. "प्राचीन खडककलेचा समृद्ध वारसा हा सिंधू संस्कृतीइतकाच पुरातन आहे," असा दावा इतिहास अभ्यासक अरुण झगडकर यांनी केला आहे.

प्राचीन खडककलेचा वारसा सिंधू संस्कृती इतकाच पुरातन : गोंडपिपरी तालुक्यातील वढोली गावाजवळ तब्बल ६० ते ७० कोरीव खडकचित्रं (Petroglyphs) आढळली आहेत. भारतातील प्राचीन खडककलेचा समृद्ध वारसा हा सिंधू संस्कृतीइतकाच पुरातन असून, त्याचे अनेक अवशेष महाराष्ट्राच्या विविध भागांत विखुरलेले आहेत. 'पेट्रोग्लिफ्स' ही प्राचीन खडककलेचा एक प्रकार आहे. यात खडकाच्या पृष्ठभागावर विविध रेषात्मक, चित्रात्मक आकृती कोरण्यात आलेल्या असतात. चंद्रपूर जिल्ह्यातील गोंडपिपरी तालुक्यातील वढोली गावाजवळ नुकत्याच सापडलेल्या अशाच प्रकारच्या पेट्रोग्लिफ्समुळं या भागात एक नवा पुरातत्त्वीय संदर्भ पुढं आला आहे.

प्राचीन काळात मानवी वस्ती असण्याची शक्यता : वढोली हे गाव विदर्भाच्या दक्षिणेकडील चंद्रपूर जिल्ह्यात, जंगलविस्तार आणि खडकाळ भूभागाच्या सीमेवर वसलेलं आहे. या गावात सापडलेले 'पेट्रोग्लिफ्स' हे एका छोट्याशा खडकाळ उंचवट्यावर उघड्यावर आहेत. या परिसरात सध्या कोणतीही नदी किंवा पुरातन जलस्रोत नाही. परंतु प्राचीन काळात याठिकाणी मानवी वस्ती असण्याची शक्यता नाकारता येत नाही.

दगडावर असं बनवलं खडकचित्र : याठिकाणी अंदाजे ६० ते ७० दगडांवर कोरीव आकृत्या स्पष्ट दिसून येतात. मुख्यतः या आकृत्या सरळ, आडव्या आणि तिरक्या रेषांनी बनलेल्या आहेत. काही ठिकाणी क्रॉस, चौकोन किंवा जाळीप्रमाणं रचना दिसून येते. कोरण्याची शैली पाहता, दगडावर टोकदार वस्तूनं ठोकून किंवा घासून या आकृती बनवल्या असाव्यात.

स्थानिकांकडून होते पूजा : वढोली गावाजवळ आढळलेल्या खडकावरील कोरीव कामांमध्ये कोणतेही स्पष्ट मानव, प्राणी किंवा देवतेसदृश चित्र दिसून येत नाहीत. परंतु रेषात्मक जाळ्यांमुळं हे संकेतचिन्ह, दिशा सूचक नकाशा किंवा एखादे धार्मिक प्रतीक असण्याची शक्यता आहे. विशेष म्हणजे या ठिकाणी स्थानिकांनी एका मोठ्या दगडाला शेंदूर लावून देवस्थान म्हणून पूजाअर्चा सुरू केली आहे. ही बाब खडककलेच्या आणि लोकपरंपरेच्या संगमाचे उदाहरण आहे.

माहिती सांगताना इतिहास अभ्यासक अरुण झगडकर (ETV Bharat Reporter)
खडककला ४,००० ते १०,००० वर्षे जुनी असण्याची शक्यता : विदर्भात विशेषतः गोंड आणि कोरकू आदिवासी जमातींची परंपरा आहे. त्यांच्या पिढ्यानपिढ्यांच्या सांस्कृतिक सवयींमध्ये निसर्ग, खडक, वृक्ष यांची उपासना महत्त्वाची आहे. त्यामुळं या कोरीव खडककलेचा संबंध पूर्व-इतिहासातील आदिवासी प्रतीकात्मक संवाद प्रणालीशी असण्याची शक्यता आहे. अशा प्रकारच्या खडककलेची तुलना रत्नागिरी (कोंकण) मधील पेट्रोग्लिफ्स किंवा मध्य भारतातील भीमबेटका येथील भित्तिचित्रांशी करता येते. काही विद्वानांच्या मते, ही खडककला सुमारे ४,००० ते १०,००० वर्षे जुनी असू शकते, विशेषतः जर ते नवपाषाण किंवा मध्यपाषाण काळातले असतील.

संशोधन अहवाल होणार सादर : या महत्त्वपूर्ण शोधाची दखल घेत झगडकर यांनी शासन आणि पुरातत्त्व खात्याकडं संवर्धन आणि संरक्षणाची मागणी केली आहे. लवकरच एक सविस्तर संशोधन अहवाल संबंधित विभागांकडं सादर केला जाणार आहे.

bookstruck.app
अश्मयुग आणि मानव उत्क्रांती Marathi
~3 minutes
अश्मयुग हा मानवी इतिहासातील अतिप्राचीन कालखंड होय  हा सु. पाच लाख ते दहा हजार वर्षापूर्वीपर्यंत साधारणत: मानण्यात येतो. सर्वसाधारणपणे माणसाला लेखनकला अवगत होण्यापूर्वीच्या इतिहासास प्रागितिहास म्हणतात. प्रागैतिहासिक काळापैकी एका सांस्कृतिक अवस्थेस, म्हणजे जेव्हा प्रामुख्याने दगडाचाच उपयोग हत्यारांसाठी केला जात होता त्या काळास ‘अश्मयुग’ असे म्हटले  जाते. 

यात मानवास कोणताही धातू व धातूचा जाणीवपूर्वक उपयोग माहीत नव्हता. प्रागितिहासाचा जवळजवळ चारपंचमांश भाग अश्मयुगानेच व्यापला आहे. अश्मयुगातील मानव त्याच्या भोवती असणाऱ्या लाकडे, हाडे, दगड इत्यादींचा उपकरणे व हत्यारे बनविण्यासाठी उपयोग करीत होता. त्यांपैकी लाकूड व हाडे सहज नाश पावणारी असल्याने या पदार्थांची आयुधे वा उपकरणे मानवी वस्त्यांच्या अवशेषांत सहसा आढळत नाहीत. मात्र दगड टिकाऊ असल्याने त्याची उपकरणे व आयुधे पुष्कळ सापडतात. यावरूनच या कालखंडास ‘अश्मयुग’ असे नाव देण्यात येते.

अश्मयुगातील माणूस सर्वत्र एकाच प्रकारची आयुधे वापरीत होता किंवा एकाच पद्धतीचे जीवन व्यतीत करीत होता असे समजणे चुकीचे ठरेल. स्थलकालपरत्वे वेग व दिशा भिन्न असल्या तरी त्याच्या जीवनात प्रगती निश्चितच होती. ही मानवी प्रगती दर्शविण्यासाठी अश्मयुगाचे पुराणाश्मयुग, मध्याश्मयुग किंवा आंतराश्मयुग आणि नवाश्मयुग असे तीन मुख्य टप्पे कल्पिण्यात आले आहेत. त्यांतही पुराणाश्मयुगाचे पूर्व- पुराणाश्मयुग, मध्यपुराणाश्मयुग आणि उत्तरपुराणाश्मयुग असे पुन्हा तीन उपविभाग पाडले आहेत. या सर्व संज्ञा मुख्यतः यूरोपातील संशोधनांतून उत्पन्न झाल्या. इतर खंडांत प्रागैतिहासिक संशोधनाचा विकास सुरू झाल्यावर असे दिसू लागले, की तेथील प्रगतीची स्तबके काहीशी भिन्न असून वरील संज्ञा त्यांना चपखलपणे लागू पडत नाहीत. नवाश्मयुगापूर्वी पूर्व, मध्य व उत्तर अशी तीनच अश्मयुगे कल्पावी असे आफ्रिका, अमेरिका व भारत येथील काही पुरातत्त्वज्ञ समजत. परंतु स्थलविशेषामुळे उत्पन्न झालेल्या पारिभाषिक संज्ञांचा आशय अद्यापही निश्चित झालेला नाही. म्हणून सर्वत्र यूरोपीय संज्ञाच वापरण्यात आल्या आहेत.अश्मयुगाच्या उपर्युक्त विभागांची सांस्कृतिक वैशिष्ट्ये स्थूलमानाने पुढीलप्रमाणे होत. यांच्या कालमर्यादांत स्थलभेदानुसार फरक आहेत.

आद्याश्मयुग (सु. पाच लाख वर्षांपूर्वीचे)
पूर्वपुराणाश्मयुग (सु. पाच लाख ते दीड लाख वर्षे)
मध्यपुराणाश्मयुग (सु. पन्नास हजार ते पंचवीस हजार वर्षे)
उत्तरपुराणाश्मयुग (सु. पंचवीस हजार ते दहा हजार वर्षे)
आंतराश्मयुग (सु. पंधरा हजार ते दहा हजार वर्षे) 
नवाश्मयुग (इ. स. पू. सु. आठ हजार वर्षांपासून )

bookstruck.app
अश्मयुग आणि मानव उत्क्रांती Marathi
~3 minutes
अश्मयुग हा मानवी इतिहासातील अतिप्राचीन कालखंड होय  हा सु. पाच लाख ते दहा हजार वर्षापूर्वीपर्यंत साधारणत: मानण्यात येतो. सर्वसाधारणपणे माणसाला लेखनकला अवगत होण्यापूर्वीच्या इतिहासास प्रागितिहास म्हणतात. प्रागैतिहासिक काळापैकी एका सांस्कृतिक अवस्थेस, म्हणजे जेव्हा प्रामुख्याने दगडाचाच उपयोग हत्यारांसाठी केला जात होता त्या काळास ‘अश्मयुग’ असे म्हटले  जाते. 

यात मानवास कोणताही धातू व धातूचा जाणीवपूर्वक उपयोग माहीत नव्हता. प्रागितिहासाचा जवळजवळ चारपंचमांश भाग अश्मयुगानेच व्यापला आहे. अश्मयुगातील मानव त्याच्या भोवती असणाऱ्या लाकडे, हाडे, दगड इत्यादींचा उपकरणे व हत्यारे बनविण्यासाठी उपयोग करीत होता. त्यांपैकी लाकूड व हाडे सहज नाश पावणारी असल्याने या पदार्थांची आयुधे वा उपकरणे मानवी वस्त्यांच्या अवशेषांत सहसा आढळत नाहीत. मात्र दगड टिकाऊ असल्याने त्याची उपकरणे व आयुधे पुष्कळ सापडतात. यावरूनच या कालखंडास ‘अश्मयुग’ असे नाव देण्यात येते.

अश्मयुगातील माणूस सर्वत्र एकाच प्रकारची आयुधे वापरीत होता किंवा एकाच पद्धतीचे जीवन व्यतीत करीत होता असे समजणे चुकीचे ठरेल. स्थलकालपरत्वे वेग व दिशा भिन्न असल्या तरी त्याच्या जीवनात प्रगती निश्चितच होती. ही मानवी प्रगती दर्शविण्यासाठी अश्मयुगाचे पुराणाश्मयुग, मध्याश्मयुग किंवा आंतराश्मयुग आणि नवाश्मयुग असे तीन मुख्य टप्पे कल्पिण्यात आले आहेत. त्यांतही पुराणाश्मयुगाचे पूर्व- पुराणाश्मयुग, मध्यपुराणाश्मयुग आणि उत्तरपुराणाश्मयुग असे पुन्हा तीन उपविभाग पाडले आहेत. या सर्व संज्ञा मुख्यतः यूरोपातील संशोधनांतून उत्पन्न झाल्या. इतर खंडांत प्रागैतिहासिक संशोधनाचा विकास सुरू झाल्यावर असे दिसू लागले, की तेथील प्रगतीची स्तबके काहीशी भिन्न असून वरील संज्ञा त्यांना चपखलपणे लागू पडत नाहीत. नवाश्मयुगापूर्वी पूर्व, मध्य व उत्तर अशी तीनच अश्मयुगे कल्पावी असे आफ्रिका, अमेरिका व भारत येथील काही पुरातत्त्वज्ञ समजत. परंतु स्थलविशेषामुळे उत्पन्न झालेल्या पारिभाषिक संज्ञांचा आशय अद्यापही निश्चित झालेला नाही. म्हणून सर्वत्र यूरोपीय संज्ञाच वापरण्यात आल्या आहेत.अश्मयुगाच्या उपर्युक्त विभागांची सांस्कृतिक वैशिष्ट्ये स्थूलमानाने पुढीलप्रमाणे होत. यांच्या कालमर्यादांत स्थलभेदानुसार फरक आहेत.

आद्याश्मयुग (सु. पाच लाख वर्षांपूर्वीचे)
पूर्वपुराणाश्मयुग (सु. पाच लाख ते दीड लाख वर्षे)
मध्यपुराणाश्मयुग (सु. पन्नास हजार ते पंचवीस हजार वर्षे)
उत्तरपुराणाश्मयुग (सु. पंचवीस हजार ते दहा हजार वर्षे)
आंतराश्मयुग (सु. पंधरा हजार ते दहा हजार वर्षे) 
नवाश्मयुग (इ. स. पू. सु. आठ हजार वर्षांपासून )
digitalsakshar.com
Digital Sakshar
3–4 minutes
views
3:17

ज्या काळातल्या हत्यारांमध्ये प्रामुख्याने दगडाची हत्यारे मिळतात त्या काळाला आपण अश्मयुग असे म्हणतो. अश्म म्हणजे दगड हे आपण या आधी शिकलो आहोत. हत्यारांचा आकार व प्रकार यावरून अश्मयुगाच्या काळाचे तीन खंड पडतात. ते असे आहेत: पुराश्मयुग, मध्याश्मयुग आणि नवाश्मयुग. पुराश्मयुग भाग १ :- पुराश्मयुगाचा काळ सामान्यपणे पाच लाख ते दीड लाख वर्षांपूर्वीपर्यंतचा समजण्यात येतो. या काळातील मानव आपले जीवन जगण्याकरिता कंदमुळे, आणि प्राण्यांचे कच्चे मांस खात होता. नुसत्या हाताने मांस सोलणे अवघड आहे, हे कळल्यावर त्याने दगडापासून हत्यारे तयार करण्यास सुरुवात केली. एक गोटा दुसऱ्या गोट्यावर आपटून दगडाचे छिलके काढणे याला ‘आघात तंत्र’ असे म्हणतात. याच आघात तंत्राचा वापर करून पुराश्मयुगातील कुशल मानव आणि ताठ कण्याच्या मानवाने हत्यारे बनविली. परंतु या हत्यारांच्या केवळ एकाच बाजूला धार असल्यामुळे ही हत्यारे ओबड – धोबड होती. कुशल मानवाने तयार केलेल्या हत्यारांचा उपयोग केवळ कठीण कवचांची फळे किंवा हाडे फोडण्यासाठी होत होता. दगडाची हत्यारे बनविताना त्या दगडाचे धारदार छिलके निघत असत. या छिलक्यांचाच उपयोग कुशल मानव कातड्याला चिकटलेले मांस काढण्यासाठी किंवा इतर अन्न पदार्थांचे तुकडे करण्यासाठी करीत असे. म्हणजेच अशा प्रकारच्या कामासाठी त्याने वेगळे हत्यार बनवले नव्हते. यावरून असे समजते की कुशल मानवाला शिकारीचे तंत्र पूर्णपणे अवगत झाले नव्हते. कुशल मानवाच्या तोडहत्यारापेक्षा ताठ कण्याच्या मानवाने बनविलेली हातकुऱ्हाड आणि फरशी जास्त प्रमाणबद्ध होती. फरशी म्हणजे पसरट पात्याची एक वेगळी कुऱ्हाडच असते. ताठ कण्याचा मानव हुशार होता. म्हणूनच त्याने आपल्याला कोणकोणत्या हत्यारांची आवश्यकता आहे याचा आधी विचार केला. आणि त्याप्रमाणे त्याने वेगवेगळी हत्यारे बनविली. दगडी हत्यार बनवताना छोटे छिलके तयार होत असत. हे छिलके काढण्यासाठी त्याने सांबरशिंगासारख्या वस्तूचा घण वापरला. शिवाय याच छोट्या छिलक्यापासून त्याने अधिक पातळ धारेच्या खरवड्या व तासण्या बनवल्या. या नवीन तयार केलेल्या हत्यारांमुळे ताठ कण्याच्या मानवाला हरीण, ससा, गवा यांसारख्या छोट्या – मोठ्या प्राण्यांची शिकार करणे शक्य झाले. त्यामुळे त्याला विविध प्रकारचे अन्न मिळू लागले.

pudhari.news
रत्नागिरी : मंडणगड तालुक्यात आढळली अश्मयुगीन कातळशिल्पे
सोनाली जाधव
6–7 minutes
Petroglyph
Petroglyph

Published on: 

20 Jun 2024, 2:29 pm

Updated on: 

20 Jun 2024, 2:45 pm

[author title="विनोद पवार" image="http://"][/author]

मंडणगड : तालुक्यातील धामणी-बोरखत येथे सापडलेल्या एका कातळ शिल्पानंतर या गावापासून वीस किलोमीटर अंतरावर असलेल्या काटे कातळकोड या गावातील मोकळ्या सडधावर बीस कातळशिल्पे आढळून आली आहेत. या शिल्पांमध्ये मानवी आकृती, पक्षी व प्राण्यांची चित्रे रेखाटण्यात आली आहेत. या कातळशिल्पांचे संशोधन व संवर्धन करण्याची आवश्यकता आहे. पूर्वकालीन ऐतिहासिक वारसा जतन होणे आवश्यक असून, तालुक्याच्या पर्यटनाला नवा आयाम मिळणार आहे.

प्रागैतिहासिक काळातील सांस्कृतिक संदर्भ म्हणून कातळशिल्पांचे विशेष महत्त्व आहे. अश्मयुगीन काळातील आदिमानवाने दगडात कोरून ठेवलेल्या विविध शिल्पे किंवा चित्रांना रॉक आर्ट किंवा पेट्रोग्लिफ्स या नावाने ओळखले जाते. विविध प्राणी, पक्षी अथवा काही अगम्य नक्षीकाम अशी ती गुढ खोदचित्रे आहेत. या शिल्पांचा काळ मध्य अश्मयुगीन म्हणजे इसवी सन पूर्व काळ असावा, असे मत अभ्यासक नोंदवतात. महाराष्ट्रात कोकण भागात अशी कातळशिल्पे आढळून आली आहेत.

रत्नागिरी-सिंधुदुर्ग जिल्ह्यात माळावर अशी शिल्पे आढळून आली आहेत. यामध्ये राजापूरमधील बारसू देवाचे गोठणे येथे मोठ्या संख्येने शिल्पे सापडली आहेत. गणपतीपुळे, उंबलें, धामणी या ठिकाणी शिल्प आढळले. बारसूनंतर इतक्या मोठ्या संख्येने मंडणगड तालुक्यात काटे येथे शिल्पे सापडल्याने त्यांचे तातडीने संशोधन व संगोपनाचे दृष्टीने प्रयत्न होणे गरजेचे आहे. कोकणातील सड्यांवर यापूर्वी आढळलेल्या कातळ शिल्पांतील रेखाचित्रांप्रमाणेच येथे चित्रे आढळून आली आहेत. ही कातळशिल्पे नेमकी कोणत्या कालखंडातील खोदलेली असतील किंवा किती वर्षे जुनी असतील याचा सखोल अभ्यास होणे गरजेचे आहे. कातळ शिल्पे काटे व कातळकोड या गावांपासून जवळ असली तरी शिल्पे असलेला कातळ भाग आहे. या भागाचे सरकारी दप्तरी सात-बारावर कातळमाळ हे नाव आहे, तरी हा परिसर वेगवेगळ्या नावाने ओळखला जातो. काही जण या भागाला सडा, गुडेघर गावातील गावकरी या भागाला मारग म्हणतात. सडघावर असलेल्या कातळ माळावर दीन ऐरणी आहेत आणि या दोन ऐरणी दरम्यान ही सर्व लहान मोठी कातळ शिल्पे कोरलेली आहेत. यामध्ये एक मानवी आकृती वेगवेगळ्या आकाराचे मासे, गाय, बैल, बकरी, मुंगूस, शंकराची पिंड आणि इतर वेगवेगळी न समजता येईल अशी लहान मोठी अशी कोरलेली वीस कातळ शिल्पे बघायला मिळतात. या कातळ शिल्पे असलेल्या भागापासून जवळच जंगलात उंच टेपावर एक पाणबुरुज सुद्धा आहे त्याला बाबुल टेंबा असेही म्हणतात. Petroglyph

महाराष्ट्राची पार्श्वभूमी
                               
 प्राचीन महाराष्ट्र :
महाराष्ट्र हे भारतातील एक पुरोगामी, प्रगत व समृद्ध,सांस्कृतिक वारसा लाभलेले राज्य आहे.मुंबई ही महाराष्ट्राची राजधानी आहे .सध्याचा गुजरात व महाराष्ट्र राज्याचे मिळून १ नोव्हेंबर १९५६  रोजी दुवैभाषिक मुंबई राज्य स्थापन झाले.त्यानंतर मध्य प्रांतातून विदर्भ व हैदराबाद राज्यातून मराठवाडा मुंबई राज्याला जोडून १ मे १९६० रोजी महाराष्ट्र राज्याची स्थापना झाली. महाराष्ट्राचे स्थान  १५.८ उत्तर ते २२.१ उत्तर अक्षांश व ७२.६६ पूर्व ते ८०.९ पूर्व रेखांशांच्यादरम्यान आहे.महाराष्ट्राचे क्षेत्रफळ ३,०७,७१३ चौकिमी.असून क्षेत्रफळाच्या दृष्टीने राजस्थान व मध्य प्रदेशानंतर देशात तिसरा क्रमांक लागतो.   महाराष्ट्राची पूर्व-पश्चिम लांबी ८०० कि.मी  व उत्तर दक्षिण ७०० कि.मी असून महाराष्ट्रात सध्या एकूण ३६  जिल्हे व ३५८  तालुके आहे.महाराष्ट्राला एकूण ७२० किमी लांबीची किनारपट्टी लाभली आहे. प्रशासनाच्या सोयीसाठी महाराष्ट्राची पुढील सहा प्रशासकीय विभागात विभागणी केली आहे.कोकण, पुणे, नाशिक, औरंगाबाद , अमरावती व नागपूर .  २०११ च्या जनगणनेनुसार महाराष्ट्राची लोकसंख्या ११,२३,७२,९७२ इतकी आहे.



महाराष्ट्र शब्दाचा अर्थ व व्युत्पत्ती  :-
महाराष्ट्र आणि मराठी भाषा यांचा उदय नेमका कधी झाला याबाबत विद्वानांमध्ये मतभिन्नता आढळते. देश, राष्ट्र या संज्ञा आजकाल राजकीय व सामाजिक दृष्टिकोनातून वापरल्या जातात. परंतु पूर्वीच्या काळी गणराज्ये होती. प्राचीन काळी ‘आर्यावर्त आणि ‘दक्षिणपथ' असे भारताचे दोन विभाग होते. उत्तरेत ‘आर्य व दक्षिणेत ‘द्रविड' लोक राहत असत. विंध्य पर्वताच्या दक्षिणेच्या प्रदेशाला ‘दक्षिणपथ' म्हटले जाई. यामध्ये कलिंग, आंध्र, सुराष्ट्र, आनर्त, अपरांत, कुंतल वं देवराष्ट्र इत्यादी भूभागांचा उल्लेख आढळतो. सर्वप्रथम कौटिल्याच्या ‘अर्थशास्त्र' या ग्रंथामध्ये अश्मक व अपरांत येथील पावसाच्या प्रमाणाचा उल्लेख आहे. इ. स. पू. तिस-या शतकात सम्राट अशोकाच्या काळात महारठ्ठ' प्रदेशात धर्मोपदेशकांना बौद्ध धर्माचा प्रचार करण्यासाठी पाठवल्याचा उल्लेख शिलालेखातुन प्राप्त होतो. इ. स. पू. दुस-या शतकातील सातवाहनांच्या नाणेघाटातील लेखात महारठ्ठ असा उल्लेख आढळतो. इ. स. ३६५ च्या मध्य प्रदेशातील ‘फेरण' स्तंभालेखात राजा श्रीधर वर्माचा सेनापती ‘सत्यनाग हा स्वत:ला महाराष्ट्री म्हणवतो. चालुक्य राजा दुसरा पुलकेशी याच्या ऐहोळ प्रशस्तीमध्ये रविकीर्ती याने महाराष्ट्राचा उल्लेख केल्याचे आढळते.

डॉ. भांडारकरांनी असे मत मांडले आहे की, ‘रठ्ठ' या शब्दाचेच संस्कृत रूप राष्ट्रीक असून ‘भोज' स्वत:ला महाभोज म्हणत  असत. तसेच राष्ट्रीक' आपणास महाराष्ट्रीक म्हणत असत. महाराष्ट्र हे नाव कुठल्याही जातीवरून व वंशावरून पडले नसून ते प्रदेशाच्या विस्तारावरून पडले, असे मत पा. वा. काणे यांनी मांडले आहे.

साधारणपणे इतिहासाची विभागणी प्रागैतिहास, इतिहासपूर्व व ऐतिहासिक कालखंड अशा तीन भागात केली जाते.



प्रागैतिहास - ज्या काळात मानवास लिपी अवगत नव्हती व मानवी जीवन हे रानटी व भटक्या स्वरूपाचे होते. या कालखंडाला प्रागैतिहास असे म्हणतात. यानुसार अश्मयुगाचा समावेश प्रागैतिहास काळात केला जातो
 इतिहासपूर्व - ज्या काळातील मानवाचे जीवन प्रागैतिहासिक मानवापेक्षा प्रगत होते व या मानवाला लिपी अवगत होती; परंतु ती अस्पष्ट किंवा गूढ असल्याने तिचे वाचन करता आले नाही. या कालखंडाला इतिहास पूर्व काळ असे म्हणतात. सिंधू संस्कृतीची गणना इतिहास पूर्वकाळात केली जाते.
 
ऐतिहासिक कालखंड - ज्या काळात मानवाचे जीवन सुसंस्कृत बनले व ज्या काळात लिखित ऐतिहासिक पुरावे प्राप्त होतात, त्या कालखंडाला ऐतिहासिक कालखंड असे म्हणतात. यानुसार इ. स. पू. ६ व्या शतकापासूनच्या कालखंडाला ऐतिहासिक कालखंड असे मानले जाते.

अश्मयुग (Stone Age) :



मानवाच्या भौतिक विकासामध्ये अश्म म्हणजेच दगडाचे खूप महत्त्व आहे. प्रारंभी मानवाने दगडाचा उपयोग करून अन्न संग्रहित केले, दगडाचा उपयोग करून निवारा बनवला, दगडावरच कलेचे आविष्कार केले व अग्नीची ही उत्पत्ती दगडाद्वारेच केली. प्रारंभिक मानवाने आपली अवजारे, हत्यारे व निवारा यासाठी दगडांचा वापर केल्याने या कालखंडाला ‘अश्मयुग' असे म्हणतात.

भारतामध्ये इ. स. १८६३ मध्ये रॉबर्ट ब्रुस फुट या भूतत्त्व विद्वानाला मद्रास जवळील पल्लवरम येथे सर्वप्रथम पुराश्मयुगीन पाषाणोपकरण मिळाल्यावरच अश्मयुगीन काळातही भारतात लोकवस्ती असल्याचे निश्चित झाले.

अश्मयुगीन हत्यारे व साधने

महाराष्ट्रात विविध ठिकाणी उत्खननाद्वारे सापडलेल्या हत्यारांच्या आधारे अश्मयुगाची तीन कालखंडात विभागणी केली जाते.



१ पुराश्मयुग (इ. स. पू. ३ लाख ते इ. स. पू. ८०००)
२ मध्याश्मयुग (इ. स. पू. ८००० ते इ. स. पू. ४०००)
३ नवाश्मयुग (इ. स. पू. ४००० ते इ. स. पू. १०००)



 पुराश्मयुग (Palaeolithic Age) :

 पुराश्मयुगीन मानवाची वैशिष्ट्ये :-

१)पुराश्मयुगीन मानवी जीवन हे भटक्या स्वरूपाचे होते.२)या काळातील मानव उन, थंडी, पाऊस, हिंस्र राणी  इ.पासून संरक्षणासाठी नैसर्गिक गुहा व मोठ्या शिळांचा आश्रय घेत असे. ३) या काळातील मानव कच्चे मांस व कंदमुळे खात असे. ४) पुराश्मयुगीन मानव झाडांच्या साली व प्राण्यांच्या कातड्यांनी आपले शरीर झाकत असे. ५)या काळातील मानवाचे शारीरिक अवशेष उत्खननातून मिळाले नाहीत.६)पुराश्मयुगीन मानव शिकारीसाठी ओबडधोबड व आकाराने  मोठ्या  दगडांचा वापर करत असे. ७)या काळातील हत्यारे बेसाल्ट व डोलेराईट या खडकापासून बनवलेली असत. नंदूरबार जिल्ह्यातील कुंभारपाडा व उमरज, धुळे जिल्ह्यातील भाडणे, नाशिक जिल्ह्यातील गंगापूर व अहमदनगर जिल्ह्यातील नेवासे येथून पुराश्मयुगीन अवशेष प्राप्त होतात.८) उत्खननात सापडलेल्या हत्यारांमध्ये हातकु-हाडी,  तासण्या, वेधण्या  यांचा समावेश   होतो.



मध्याश्मयुग (Mesolithic Age) :

मध्याश्मयुगीन मानवाची वैशिष्ट्ये :-

१)पुराश्मयुगीन थंड हवामानात बदल होऊन मध्याश्मयुगात हवा  उबदार बनली. त्यामुळे या काळातील हत्तीसारखे मोठे प्राणी नाहीसे होऊन चपळ व आकाराने लहान प्राणी अस्तित्वात आल्याने या मानवाला शिकारीच्या तंत्रात बदल करावा लागला. त्यांनी सूक्ष्म आणिभूमितीजन्य आकाराची हत्यारे बनवली.यालाच'सूक्ष्मास्त्रे' म्हणतात. सूक्ष्मास्त्रे (microliths) ही मध्याश्मयुगाची प्रमुखवैशिष्ट्ये आहेत.२)या काळातील हत्यारांमध्ये हातकु-हाडी, वेधण्या,  तासण्या, तीराग्रे, टोकदार हत्यारांचा  समावेश होतो. ३)मध्याश्मयुगाच्या शेवटच्या काळात शेतीचा शोध लागला. ४) मृदभांड बनवण्याची कला या मानवाने अवगत केली. ५)या काळातील मानव पशुपालन करू लागला. ६)मानवाला याच काळात अग्नीचा शोध लागला.
७) या काळातील हत्यारे ही ज़स्पर, चर्ट, एगट अशा दगडांची  बनवली जाऊ लागली. ८)शिकारीसाठी व संरक्षणाच्या सामूहिक भावनेतून हा मानव  टोळी करून राहू लागला. ९)गाय, बैल, म्हैस, घोडा, शेळी, मेंढी यांची या काळात शिकार केली जाई. १०)पुरलेल्या मृताजवळ सापडलेल्या दैनंदिन वापरातील भांडी व  हत्यारांवरून त्या काळातील मानवाचा मरणोत्तर जीवनावर विश्वास असल्याचे दिसून  येते.११)नेवासे, नांदेड, जळगाव व गोदावरी नदीच्या  खो-यात या काळातील हत्यारे सापडली  आहेत. 

     

नवाश्मयुग (Neolithic Age) :

नवाश्मयुगीन मानवाची वैशिष्ट्ये :-
१)दगडी नांगराद्वारे शेती करण्याचे तंत्र या काळात मानवाने अवगत केले. २)शेतीसाठी उपयुक्त अवजारांची निर्मिती या मानवाने केली.३)या काळातील मानवाने अन्न संचयनासाठी मृदभांड्यांचा वापर मोठ्या प्रमाणात सुरू केला. ४)कुंभाराच्या चाकाचा शोध लागल्याने या काळातील मानवाचे जीवन गतिमान बनले. ५)या काळातील मानव हा अग्नीचा उपयोग करू लागला. ६)शेतीमुळे मनुष्य जीवनास स्थैर्य प्राप्त झाले व समूहाने गावात राहण्याची सुरुवात झाली. ७)उत्खननातून मोठ्या प्रमाणात भित्तिचित्रे मिळतात. ८)झाडांच्या साली व कातडी वस्त्राबरोबरच कापसाद्वारे आणि लोकरीद्वारे कापड विणण्याचे ज्ञान या काळातील मानवाला झाले. ९) या काळातील घरे, लाकडाची, दगडाची बनली होती.झोपडी बांधूनही लोक राहात होते. व खेड्यातहीघरे बांधल्याचे अवशेष येथे प्राप्त होतात. १०)या काळातील मानव हे मूर्तिपूजक होते.
 
   कार्बन १४ पद्धती :

पुरातत्त्वीय पुराव्यांचे कालमापन करण्यासाठी या पद्धतीचा वापर केला जातो. ही पद्धत एफ. डब्ल्यू. लिबी यांनी १९४९ साली शोधून काढली व १९६० साली परिपूर्ण केली. या कामाबद्दल त्यांना रसायनशास्त्राचे नोबेल पारितोषिक देण्यात आले.

 प्रत्येक सजीव (मानव, वनस्पती, प्राणी) जिवंत असेपर्यंत कार्बन-डायऑक्साईडद्वारे कार्बन १४ शरीरात घेत असतो. सर्व सजीवांमध्ये सी-१४ चे प्रमाण एकच असते व मृत्यूनंतर सर्व सजीवांच्या अवशेषातून सी-१४ एकाच प्रमाणात बाहेर पडते. जिवंतपणी असलेल्या सी-१४ चा अर्धा भाग मृत्यूनंतर ५५६८ वर्षांनंतर नाहीसा होतो. या कालावधीला सी-१४ चे अर्धे आयुष्य म्हणतात.

या पद्धतीनुसार आधुनिक काळातील कार्बनच्या किरणोत्सर्जनाशी मृत प्राण्याच्या किरणोत्सर्जनाची तुलना केली असता प्राण्याचा मृत्यू केव्हा झाला हे ठरवता येते.

सिंधू संस्कृती  (इ.स.पू. २५००- इ.स.पू. १७००) :

सुमारे ५००० वर्षांपूर्वी जगातील प्रमुख चार नद्यांच्या काठी मानवी संस्कृती निर्माण झाल्या. यामध्ये तैग्रीस आणि युफ्रेटिस नक्ष्यांच्या काठी मेसोपोटेमिया संस्कृती, नाईल नदीकाठी इजिप्तची संस्कृती, सिंधू नदीच्या काठी सिंधू संस्कृती आणि हो-हँग-हो नदीच्या काठी चिनी संस्कृतीचा उदय झाला. नद्यांच्या किनाच्याजवळील गाळाची व सुपीक मृदा, शेतीस योग्य वातावरण व पाण्याचा उपयोग करून मानवाने शेतीतून अन्नोत्पादने वाढवली. अन्नधान्यांचे अतिरिक्त उत्पन्न वाढल्याने काही मानवांनी शेती कार्यास पूरक व्यवसाय, घरांची निर्मिती, धातू उद्योग अशा प्रकारचे कार्य करण्यास सुरुवात केली. या वस्तूंच्या देवाण-घेवाणीसाठी ग्रामीण समुदायात राहणारा मनुष्य मोठ्या संख्येने एकत्र येऊन राहू लागला व यातूनच नागरी संस्कृतीची निर्मिती झाली.

सिंधू संस्कृतीचा शोध  : - सिंधू संस्कृतीचा पहिला उल्लेख चाल्र्स मेसन यांनी १८२६ मध्ये केला; परंतु सिंधू संस्कृतीची खरी ओळख १९२०-२१ साली लाहोर-मुलतान रेल्वेसाठी खोदकाम करताना सापडलेल्या विटा, मुद्रा व इतर पुरातत्त्वीय अवशेषांमुळेच झाली. जॉन मार्शल, राखालदास बॅनर्जी, दयाराम सहानी, माधव स्वरूप वत्स इ. पुरातत्त्व विद्वानांच्या परिश्रमपूर्वक उत्खननामुळे एका अतिप्राचीन संस्कृतीचा शोध लागला. दयाराम सहानी यांनी १९२१ मध्ये या संस्कृतीतील ‘हडप्पा' शहराचा उत्खननातून शोध लावला. हडप्पा' हे शहर सिंधू संस्कृतीमधील सर्वप्रथम उत्खननीत स्थळ असल्याने व सिंधू संस्कृतीच्या इतर उत्खननित शहरातील सर्वच लक्षणे या शहरात आढळत असल्याने सिंधू संस्कृतीलाच 'हडप्पा संस्कृती' असे ही म्हणतात.

स्थान-विस्तार  : - पूर्वेस आलमगीरपूर, पश्चिमेस सुत्केगेंडोर, दक्षिणेस महाराष्ट्रातील दायमाबाद व उत्तरेस जम्मूमधील मांडा अशा याच्या सीमा आहेत. पूर्व पश्चिम १६०० किमी व दक्षिण उत्तर ११०० किमी याची लांबी, रुंदी असून एकूण १२,९९,६०० चौकिमी भारताचा भाग याने व्यापला आहे. पंजाब, राजस्थान, गुजरात, बलुचिस्तान, हरियाणा व महाराष्ट्र इत्यादी प्रदेशात या संस्कृतीचा विस्तार झाला आहे.

 सिंधू संस्कृतीची वैशिष्ट्ये  : - हडप्पा, मोहनजोदडो, रंगपूर, सुरकोटडा, कालीबंगन, रोपड, दायमाबाद, मेहरगढ, चहूदंडो, ढोलवीरा अशा ४०० हून अधिक ठिकाणच्या उत्खननित अवशेषांवरून सिंधू संस्कृतीची पुढील काही वैशिष्ट्ये दिसून येतात. 

१) सिंधू संस्कृती ही कास्ययुगीन संस्कृती आहे.
२) ही एक नागरी व व्यापार प्रधान संस्कृती आहे.
३) सिंधु संस्कृतीमध्ये सामाजिक व धार्मिक वैमनस्यांचा अभाव आहे. 
४) अन्य संस्कृतीशी सिंधू संस्कृतीचे व्यापारीक संबंध 
   असल्याचे उत्खननीत पुराव्यांवरून समजते.
५) सिंधू संस्कृतीमधील लोकांना लिपीचे ज्ञान होते.
६) सिंधू संस्कृती ही एक शांतताप्रिय संस्कृती होती.
७) सिंधू संस्कृतीमध्ये मंदिरांचा अभाव दिसून येतो.
८) सिंधू संस्कृतीमधील वजनमापात समानता दिसून येते.
९) सिंधू संस्कृतीच्या सर्व नगरांना तटबंदी होती. .
१०) सिंधू संस्कृतीमध्ये नगर नियोजनास महत्त्व होते.

 सिंधू संस्कृतीच्या ऱ्हासाची कारणे  : - सिंधू संस्कृतीच्या  -हासांच्या कारणाबाबत इतिहासकारांनी विविध मते नोंदवली आहेत. काही इतिहासकारांच्या मते, हवामानातील बदल, सिंधू नदीच्या प्रवाहाच्या दिशेत बदल, सततचा दुष्काळ यामुळे लोकांनी स्थलांतर केले असावे. त्यामुळे या संस्कृतीचा -हास झाला असावा. तसेच काही इतिहास संशोधकांनी आर्यांच्या आक्रमणामुळे, व्यापारातील मंदीमुळे व भूकंपासारख्या नैसर्गिक आपत्तीमुळे ही संस्कृती नष्ट झाली असावी, असे मत नोंदवले आहे. सुमारे इ. स. पू. १७५० च्या दरम्यान सिंधू संस्कृतीचा -हास झाला असावा.

ताम्रपाषाण युग (Chalcolithic Age)

 सिंधू संस्कृतीच्या उत्तर काळात महाराष्ट्रातील काही भागात   तांब्याचा वापर करून कृषीप्रधान संस्कृती निर्माण झाल्या. या काळातील अवजारे व हत्यारे ही ताम्र (तांबे) व पाषाणांच्या संयुक्त वापराने बनवलेली असल्याने या कालखंडाला ‘ताम्रपाषाण युग' असे म्हणतात.

महाराष्ट्रातील ताम्रपाषाण स्थळे व कालखंड : - प्रकाशे, नेवासे, चांदोली, सोनगाव, टेक्वाडे, सावळदे, दायमाबाद, बहाळ अशा महाराष्ट्रातील अनेक ठिकाणी ताम्रपाषाण संस्कृतीचे अवशेष प्राप्त झाले आहेत व याचा कालखंड सुमारे इ. स. पू. २२०० ते इ. स. पू. १००० असा मानण्यात येतो.

पुरातत्त्व विद्वानांनी उत्खननीत ताम्रपाषाण युगीन स्थळांचे सावळदा संस्कृती, उत्तर सिंधू, दायमाबाद, माळवा व जोर्वे संस्कृती असे विभाजन केले आहे.

ताम्रपाषाण युगाची वैशिष्ठ्ये  : -

१) गृहरचना - ताम्रपाषाण संस्कृतीच्या लोकांची गृहरचना उत्कृष्ट व  योजनाबद्ध होती. ही      घरे आयताकृती तसेच गोलाकार असत.यातील आयताकृती घरे कुडाच्या भिंतींची असते. तर गोलाकार घरे झोपड्यांसारखी असत.घरासाठी भाजलेल्या विटांचा वापर केला जाई.

२) उत्खननीत भांड्यामध्ये गोलाकार भांडी, वाडगे, लोटा, उथळ तळाची भांडी मिळतात. त्यावर हरिण, मोर, चित्ता, बैल, पक्षी इत्यादींची चित्रे काढलेली आढळतात.

३) हत्यारे - ताम्रपाषाण युगीन लोकांनी दगड व हाडांच्या बरोबरच हत्यारे व अलंकार बनवण्यासाठी तांब्याच्या धातूचा वापर करण्याचे तंत्र विकसित केले. चालकोपायराईटचा उपयोग तांब्याच्या धातूला वितळवण्यासाठी करत असत. तांब्यापासून कुन्हाडीचे पाते, टोकदार हत्यारे, चाकू, बाण, भाल्याचे टोक बनवत असत.

४) कृषी जीवन - ताम्र व पाषाण यांच्या संयुक्तिक वापराने शेतीसाठी उपयुक्त अवजारांची निर्मिती केल्याचे दिसते. ताम्रपाषाण संस्कृतीतील हे लोक शेती करू लागल्याने त्यांच्या स्थायी स्वरूपाच्या वास्तव्यातून खेडी निर्माण झाली व यातूनच ग्रामीण महाराष्ट्राचा प्रारंभ झाला. या काळात गहू, तांदूळ, मसूर, मूग, उडीद, बाजरी इ. धान्ये पिकवली जात. तर गाय, बैल, म्हैस इ. प्राणी पाळले जात. उत्खननातून सापडलेल्या मासे पकडण्याच्या गळावरून मासेमारीचा व्यवसाय या काळात मोठ्या प्रमाणात असल्याचे दिसते.

५) समाजजीवन व धार्मिक संकल्पना - या काळातील मानव हा शाकाहार व मांसाहारांचा अन्नामध्ये समावेश करत. कंदमुळे व फळे याबरोबरच दुधाचाही आहारात समावेश करत. मनोरंजनासाठी सामूदायिक शिकार, प्राण्यांच्या झुंजी हे खेळ प्रचलित होते. उत्खननातून प्राप्त मातृदेवीच्या मूर्तीवरून हे मातृपूजा व प्राणी पूजा करत असावेत.

६) अलंकार - ताम्रपाषाण युगीन मानव शंख-शिंपल्यांच्या बांगड्या, तांबे धातूपासून बनवलेली आभूषणे, दगडी मणी व हस्तिदंताचीही सौंदर्य प्रसाधनांसाठी वापर करत असत. बांगड्या, अंगठ्या, कर्णफूले इ. अलंकारांचा हे लोक वापर करत असत.

७) दफन पद्धती- ताम्रपाषाण युगीन लोकांचा मरणोत्तर जीवनावर विश्वास असल्याचे उत्खननात, मृत अवशेषांच्या पुराव्यांवरून दिसून येते. मृतदेह पुरण्यासाठी दफनकुंभ व शवपेटीचा वापर करत. मृताच्या दैनंदिन वापरातील वस्तू मृतासोबतच पुरल्याचे दिसून येते.

महापाषाणयुगीन संस्कृती (Megalithic Age) :

'Megas' म्हणजे मोठा व 'litho' म्हणजे दगड या दोन शब्दांपासून Megalith म्हणजेच मोठा दगड हा शब्द बनला आहे. मृत्यूनंतर मृताच्या दैनंदिन व आवडीच्या वस्तू त्यासोबतच पुरल्या जात व याजागी त्याची स्मृती म्हणून एक मोठा दगड किंवा दगडाचा ढीग विशिष्ट पद्धतीने ठेवला जाई. दफनासाठी वापरलेल्या या  पाषाणाच्या विशिष्ट पद्धतीमुळे या कालखंडाला ‘महापाषाण युग असे म्हणतात. महाराष्ट्रातील महापाषाण युगाचा काळ हा इ. स. पू. १००० वर्षांपूर्वीचा आहे. ही एक लोहयुगीन संस्कृती आहे. महाराष्ट्रात धुळे जिल्ह्यातील रंजाळा, जळगाव जिल्ह्यातील बहाळ, टेकवाड़े तसेच नागपूर जिल्ह्यातील माहरझरी इ. ठिकाणी याचे अवशेष प्राप्त होतात.

महाराष्ट्रातून प्राप्त महापाषाण उत्खननाद्वारे या काळाची पुढील वैशिष्ट्ये दिसून येतात.

१) या काळातील मृत अवशेष शिलावर्तुळात, खड्ड्यात व शवपेटीत   ठेवल्याचे अनेक सांगाडे उत्खननातून प्राप्त होतात.
 २) मृताबरोबर लोखंडी भाले, तलवारी, कट्यारे, कु-हाडी अशा हत्यारांचे  अवशेष प्राप्त झाले आहेत.
३) गहू, ज्वारी, बाजरी, उडीद, तांदूळ यांचे उत्पादन या काळात घेतले     जाई.
 ४) कुत्रा, बैल, घोडा, गाय, हरिण, रानडुक्कर, बकरा इ. प्राण्यांचा मांसाहारासाठी वापर केला जाई.
 ५) या काळातील मानव मातीच्या घरात, कच्च्या विटा व कुडांनी     बांधलेल्या घरात राहात असत.
 ६) या काळातील मानव सोने, चांदी, ब्राँझ धातूपासून बनवलेले अलंकार    वापरत असत.
 ७) विदर्भातील नैकुंड येथे लोह शुद्ध करण्याची भट्टी सापडली आहे.  यावरून धातू व्यवसाय हा या काळात मोठ्या प्रमाणात  चालत असल्याचे संकेत प्राप्त होतात.  
 ८) या काळातील मानवांनी शेतीबरोबरच पशूपालनासही महत्त्वदिले होते.कुंभाराच्या चाकावर मृदभांडी बनवणे, त्यावर चित्रकला, नक्षीकाम व  भाजून पक्के बनवणे यामध्ये ते कुशल असल्याचेपुरावे मिळतात.
९) काच, दगडी मणी, नीलमणी यांचाही वापर अलंकार म्हणून करत    असत.


सातवाहन कालखंड (इ.स.पू. २३०ते इ.स. २३०) :

प्रस्तावना

मौर्य साम्राज्याच्या ऱ्हासानंतर उत्तर भारतात गुंग आणि कण्वांचे वर्चस्व निर्माण झाले. याचवेळी महाराष्ट्रात सातवाहन घराण्याचा उगम झाला. सातवाहनांनी राजकीय स्थैर्य, उत्कृष्ट प्रशासन, धार्मिक सहिष्णुता व व्यापारास चालना दिल्याने सुस्थिर शासन निर्माण केले. त्यामूळे कला, स्थापत्य व साहित्यामध्येही भरभराट झाली.

सातवाहनाच्या ३० राजांनी इ. स. पू. २३० ते इ. स. २३० असे एकूण ४६० वर्षे महाराष्ट्रावर राज्य केले. जागतिक नकाशावर महाराष्ट्रास सर्वप्रथम दर्शवणारे व महत्त्व प्राप्त करून देणारे सातवाहन हेच पहिले महाराष्ट्रातील राजघराणे होय. .

 सातवाहनांचे मूळ स्थान व कालखंड : - सातवाहनांच्या मूळ स्थानाविषयी विद्वानांमध्ये एकमत नाही. काही इतिहासकारांच्या मते ते मूळचे आंध्रप्रदेशचे आहेत. तर डॉ. मिराशीच्या मताप्रमाणे सातवाहनांचा मूळ प्रदेश विदर्भ होय. उपलब्ध ऐतिहासिक साधनांवरून सातवाहनांचे मूळ स्थान महाराष्ट्र असून पैठण (प्रतिष्ठान) ही त्यांची राजधानी होय.

 सातवाहनांच्या इतिहासाची साधने  : -  सातवाहन कालखंडाचा इतिहास जाणून घेण्यासाठी कोल्हापूर, पैठण, क-हाड, नाशिक, भोकरदन येथील पुरातत्वीय उत्खननांचा उपयोग होतो. तसेच उत्खननातून सापडलेल्या नाण्यांद्वारेही यांचा इतिहास समजण्यास मदत होते. याचप्रमाणे कालें, भाजे, बेडसे, पितळखोरे, अजंठा, कान्हेरी येथील लेणी, चैत्य, स्तुप, विहार व शिलालेख इ. च्या अवशेषांद्वारेही सातवाहनांच्या इतिहासावर प्रकाश पडतो. गुणाढ्याची ‘बृहत्कथा', राजा हाल याचा गाथा सप्तशती' इ. साहित्यातून व परकीय प्रवाशांच्या प्रवासवर्णनावरून सातवाहनांची माहिती मिळते.

सातवाहन राजवंशातील प्रमुख राजे  :

१) सिमुक  : - सिमुक हा सातवाहन राजवंशाचा संस्थापक होय. राजा सिमुकने शेवटचा कण्व राजा सुशर्मा याला ठार केले आणि आपली सत्ता प्रस्थापित केली. याने ‘विदर्भ आणि ‘विदिशा जिंकून घेतले व स्वत:ला ‘दक्षिणपथपती' असे बिरुद धारण केले.

२) सातकर्णी प्रथम : - राजा सिमुक नंतर त्याचा लहान भाऊ ‘कृष्ण' गादीवर आला. त्याने नाशिक जिंकून घेतले व १८ वर्षे राज्य केले. राजा कृष्णच्या नंतर सिमुकचा मुलगा सातकर्णी याला राज्य मिळाले. सातकर्णी प्रथम व त्याची राणी नागनिका यांची प्रतिमा जुन्नरच्या (नाणेघाट) प्रतिमा मालिकेत कोरल्याचे पुरावे मिळतात. हा पराक्रमी व मुत्सद्दी राजा होता. याने कलिंग नरेश खारवेलचा पराभव केला. हा वैदिक धर्माचा कट्टर पुरस्कर्ता होता. त्याने आपल्या हयातीत दोन अश्वमेध यज्ञ व एक राजसूय यज्ञ केल्याचे पुरावे आहेत. प्रथम सातकर्णीच्या शौर्यामुळे या राजवंशातील सर्व राजे आपल्या नावासमोर सातवाहन असा शब्दप्रयोग न करता सातकर्णी असाच करू लागले. यानंतर सुमारे एक शतक सातवाहनांच्या वाढत्या सत्तेला व सामथ्र्याला पायबंद बसला. सातकर्णीनंतर शकांच्या आक्रमणापुढे सातवाहनांचे राज्य दुर्बल बनले.

३)  राजा हाल :- या सातवाहन राजाबद्दल फक्त वाङ्मयीन साधनांच्या आधारे माहिती मिळते. याने प्राकृत भाषेला राजाश्रय देऊन गाथा सप्तशती' हा प्राकृत काव्य संग्रह रचल्याची माहिती मिळते.

४) गौतमीपुत्र सातकर्णी  : - गौतमीपुत्र सातकर्णीन सातवाहन सत्तेचे पुनरुज्जीवन केले. माळव्यापासून दक्षिणेकडील नाशिक प्रशस्तीमध्ये आपल्या मुलाचे वर्णन करताना ‘त्रिसमुद्रतोयपितवाहन' म्हणजेच ज्याचे घोडे तिन्ही समुद्राचे पाणी प्यायले आहेत असे गौरवपर उद्गार गौतमी बलश्री हिने काढले आहेत. कानडी मुलखापर्यंत त्याचे साम्राज्य पसरले होते. याने शक पल्लव, यवन यांचा पराभव केला व क्षत्रप राजा नहपानच पराभव करून सातवाहनांची प्रतिष्ठा वाढवली व दरारा निर्माण केला. आईबद्दल असलेल्या आदरामुळे त्याने स्वत:च्या नावापूर्वी आईचा आवर्जून उल्लेख केलेला दिसतो.

५) यज्ञश्री सातकर्णी  : - हा सातवाहन घराण्यातील शेवटचा मोठा राजा होय. शकांनी यापूर्वी जिंकून घेतलेला प्रदेश त्याने परत जिंकून घेऊन आपले साम्राज्य वाढवले. जहाजाचे चित्र  असलेल्या त्याच्या काही नाण्यांवरून त्यांचे आरमार व व्यापाराविषयी माहिती मिळते.

शकांची आक्रमणे, सततची युद्धे, विशाल साम्राज्य, दुर्बल वारसदार या कारणांमुळे सातवाहन सत्तेचा -हास झाला.

सातवाहनकालीन आर्थिक परिस्थिती :

१) शेती :-  सातवाहनांचा काळ हा महाराष्ट्राच्या इतिहासात आर्थिक समृद्धीचा होता. या काळात शेती हा लोकांचा प्रमुख व्यवसाय होता. उत्पादनाचा १/१० भाग भूमीकर म्हणून शेतकरी राजाला देत. शेतीस पाणी पुरवठा करण्यासाठी तलाव, कालवे व विहिरी खोदल्या जात. “बृहतसंहिता'मध्ये खरीप व रब्बी पिकांचा उल्लेख केला आहे. शेती बरोबरच दूध व मांस यासाठी पशुपालन हा व्यवसाय केला जाई. गाय, बैल, घोडा, गाढव, खेचर, बकरी, मेंढी, कुत्रा, हत्ती, उंट हे प्राणी पाळले जात असत.

२) उदयोगधंदे - वस्त्रोद्योग हा या काळातील महत्त्वाचा उद्योग होय. साधे, तलम, मलमली रेशमी असे वस्त्रांचे उत्पादन या काळात घेतले जाई.

सोने, चांदी, पितळ, लोखंड, तांबे या धातूंचा दागिने, मूर्ती, कृषी अवजारे, घरगुती वस्तू बनवण्यासाठी वापर केला जाई. सातवाहन राजांच्या प्रोत्साहनामुळे परकीय व्यापार मोठ्या प्रमाणावर चालत होता व यामुळे भडोच, सोपारा ही बंदरे व पैठण, तेर सारखी शहरे प्रसिद्धीस आली.

सातवाहनकालीन धार्मिक परिस्थिती :

सातवाहन राजे हे वैदिक धर्माचे अनुयायी व पुरस्कर्ते होते. यांनी अश्वमेध व राजसूय यज्ञ करून यज्ञपरंपरेचे पुनरूज्जीवन केले. यज्ञप्रसंगी भरपूर दानधर्म केला जाई. सूर्यपूजा, यक्षपूजा, मातृदेवता, नागदेवता इत्यादींना या काळात महत्त्व प्राप्त झाले.  

शैव व वैष्णव धर्माबरोबरच बौद्ध धर्माचाही विकास झाल्याचे दिसून येते. बौद्ध भिक्षूसाठी अनेक विहार व स्तूप बांधून त्यांच्या उदरनिर्वाहाचीही व्यवस्था केली जाई.



सातवाहनकालीन सामाजिक परिस्थिती :

सातवाहन काळात वर्णाश्रम व्यवस्था प्रचलित होती. ब्राम्हण, क्षत्रिय, वैश्य व शूद्र या चार वर्णाचा त्यात समावेश होता. त्यांची कर्तव्ये व अधिकार ठरलेले असत. वर्णव्यवस्थेचे रूपांतर जाति व्यवस्थेत झाले. जातीचे पोटजाती व उपजातींमध्ये भेद निर्माण झाले. सोळा संस्कारांना महत्त्वाचे स्थान प्राप्त झाले होते.

 सातवाहन काळात एकत्रित कुटुंब पद्धती प्रचलित होती. लोक शाकाहारी व मांसाहारी अन्न आहारात घेत असत. या काळातील शिल्पकला, चित्रकला व उत्खननीत वस्तूंवरून त्यांची सौंदर्यदृष्टी स्पष्ट होते. यामध्ये बांगड्या, ताईत, मणी, कर्णभूषणे, पैंजण, अंगठ्या यांचा समावेश होतो. शिकार, दुवंदव, रथशर्यती, कोंबड्यांची झुंज, सोंगट्या, फुगडी, गायन, वाद्य, नृत्य, सारिपाट ही मनोरंजनाची साधने होती.


सातवाहनकालीन प्रशासन व्यवस्था :

२००० वर्षांपूर्वी वाहतुकीच्या सोयी नसताना सातवाहन राजांनी ४६० वर्षे उत्कृष्ट प्रशासनामुळे महाराष्ट्रावर राज्य केले. रज्जक, अमात्य, सचिव अशा मंत्र्यांची नेमणूक राजांच्या मदतीसाठी केली जाई. सातवाहनकालीन प्रशासनातील शेवटचा घटक ‘ग्राम' होय. गावच्या प्रमुखास ग्रामणी, ग्रामपती, ग्रामकुट म्हटले जाई.

सातवाहनकालीन कला व स्थापत्य :

परकीय बाजारपेठांत भारतीय वस्तूंना महत्त्व असल्यामुळे पैठण, तेर, भोकरदन, कोल्हापूर अशा कला केंद्रांचा उदय झाला. येथे कलाकुसरीच्या वस्तू, हस्त कारागिरीच्या वस्तू बनवल्या जात. सातवाहन कालीन कलेमध्ये प्रामुख्याने वास्तू, शिल्प, स्थापत्य आणि चित्रकलेचा समावेश होतो.

स्तुपाची निर्मिती ही गौतम बुद्ध व बोधिसत्त्व प्राप्त केलेल्या साधु पुरुषांच्या अवशेषांचे व स्मृतीचे जतन करण्यासाठी केली जाई. स्तूप हे आकाराने अर्धगोलाकार असून या काळातील स्तूप अजंठा, कार्ले, भाजे, नाशिक येथील लेण्यांत आढळून येतात. बौद्ध भिख्खूच्या प्रार्थना स्थळाला चैत्यगृह म्हणतात. बौद्ध भिख्खूच्या निवासासाठी विहारांची निर्मिती करण्यात आली. सातवाहन कालोन भित्तिचित्राचे नमुने अजंठा, वेरूळ, कार्ले , भाजे, जुन्नर, पितळखोरा इ. ठिकाणच्या लेण्यातून पाहावयास मिळतात. अशा प्रकारे सातवाहन काळामध्ये महाराष्ट्राचा सर्वांगीण विकास झाल्याचे दिसून येते.



अजंठा स्थापत्य कला लेणे


वाकाटकघराणे :
सातवाहन साम्राज्याच्या अस्तानंतर वाकाटकांच्या सत्तेचा महाराष्ट्रात उदय झाला. वाकाटक काळात महाराष्ट्राची सामाजिक,  आर्थिक व सांस्कृतिक प्रगती झाली. 

राजकीय परिस्थिती  : - अजंठा लेण्यांमध्ये वाकाटकांना ‘वाकाटक वंशकेतु' असे म्हटले आहे. वायुपुराण व बिदर ताम्रपटातून ‘विंध्यशक्ती' याला वाकाटक घराण्याचा संस्थापक असे म्हटले आहे. विंध्यशक्तीच्या मृत्यूनंतर त्याचा पुत्र प्रथम प्रवरसेन याने इ. स. २७० ते इ. स. ३३० पर्यंत ६० वर्षे राज्य केले. हा या घराण्यातील सर्वांत बलशाली राजा होय. याने कोल्हापूर, सातारा, सोलापूर, दक्षिण कोसल, कलिंग व आंध्र हा भाग आपल्या वर्चस्वाखाली आणला. हा वैदिक धर्मानुचारी असून याने चार अश्वमेध यज्ञ केले.

प्रवरसेनच्या मृत्यूनंतर त्याच्या साम्राज्याची विभागणी गौतमीपुत्र व सर्वसेन या पुत्रामध्ये झाली.

१) ज्येष्ठ शाखा : - प्रवरसेन पुत्र गौतमीपुत्र यांचा मुलगा पहिला रुद्रसेन जो समुद्रगुप्ताचा समकालीन होता. समुद्रगुप्ताशी याने सलोख्याचे संबंध ठेवले. यानंतर याचा पुत्र पृथ्वीसन हा राजा बनला. त्याने आपला मुलगा दुसरा रुद्रसेनचा विवाह दुसरा चंद्रगुप्तची कन्या प्रभावती गुप्तशी केला व राजधानी नागपूरजवळ नंदिवर्धन येथे आणली. इ. स. ४९०च्या सुमारास वाकाटकांची ज्येष्ठ शाखा ही वत्सगुल्म शाखेत विलीन झाली.

२)वत्सगुल्म शाखा : - पहिल्या प्रवरसेनचा द्वितीय पुत्र सर्वसेन याने राजधानी वत्सगुल्म (सध्याचे वाशिम) येथे स्थापन केली.

सर्वसेन हा उत्तम कवी होता. त्याने ‘धर्ममहाराज' ही उपाधी घेतली व 'हरिविजय' या प्राकृत काव्याची रचना केली. यानंतर दुसरा विंध्यशक्ती, दुसरा प्रवरसेन, देवसेन व हरिसेन असे राजे होऊन गेले. इ. स. ५५० च्या सुमारास महिष्पतीच्या कलचुरींनी वाकाटकांच्या विदर्भात आपले राज्य स्थापन केल्याने या सत्तेचा -हास झाला.

वाकाटकाचे योगदान : - वाकाटक राजे हे साहित्य, विदया व कलेचे भोक्ते व आश्रयदाते होते. हिंदू धर्म आणि संस्कृती यांचे रक्षण करण्याची जबाबदारी यांनी पार पाडली. धार्मिक दृष्ट्या सहिष्णू असल्याने या काळात सर्वच धर्माचा विकास झाला. वंशपरंपरागत राजकीय सत्ता असूनही यांनी सत्तेचा अनियंत्रित वापर केला नाही. योग्य लष्कर व प्रशासनाद्वारे यांनी आपला साम्राज्य विस्तार व सुस्थिरता टिकवण्याचे काम केले. जमीन महसूल, आयात-निर्यात कर, मांडलिक राजांकडून येणारी खंडणी व राजकीय स्थिरतेमुळे या काळात आर्थिक प्रगती झाल्याचे दिसून येते.

कवी कालिदासाचे अनेक वर्षे वाकाटकाकडे वास्तव्य असल्याने त्यांनी 'मेघदुत'ची रचना येथे केली. वाकाटक राजांनी कवी व विद्वानांना राजाश्रय दिला. थोडक्यात वाकाटकचा काळ हा महाराष्ट्रातील सामाजिक, राजकीय, आर्थिक, धार्मिक आणि सांस्कृतिक वैभवाचा काळ म्हणून ओळखला जातो.

                           
 बदामीचे चालुक्य घराणे :

वाकाटकानंतर महाराष्ट्रामध्ये चालुक्य घराण्याची सत्ता प्रस्थापित झाली.

राजकीय परिस्थिती  : - बदामीच्या चालुक्य घराण्यातील पहिला राजा जयसिंह होय. पहिला पुलकेशी हा या घराण्यातील बलशाली राजा होय. याने अश्वमेध यज्ञ केला. साम्राज्याची व वातापी (बदामी) या राजधानीची पायाभरणी यानेच केली. कीर्तीवर्मन हा एक पराक्रमी राजा बदामीच्या चालुक्य घराण्यात होऊन गेला. याने आपल्या ११ वर्षांच्या काळात कदंब व नल राजांचा पराभव केला. अनेक राजांना आपले मांडलिक बनवले. कीर्तीवर्मनचा लहान भाऊ मंगलेश हा गादीवर आला. याने कल्चुरी व रेवती राजांचा पराभव केला. यांच्या कारकिर्दीच्या शेवटच्या काळात झालेल्या यादवी युद्धात त्याचा पुतण्या दुसरा पुलकेशी विजयी होऊन गादीवर आला.

 दूसरा पुलकेशी हा या घराण्यातील सर्वांत पराक्रमी व बलशाली राजा होय. वारसाहक्काकरिता राजकीय अस्थिरता निर्माण झाली होती. परंतु दुस-या पुलकेशीने सामंत व मांडलिक राजांवर पकड निर्माण केली. सैन्यव्यवस्था बळकट बनवली. याने मौर्य, कलचुरी, नल, राष्ट्रकूट, कदंब, गंग, आलुप वगैरे राजांचा पराभव करून महाराष्ट्र, कोकण, माळवा, विदर्भ इ. प्रांत जिंकून घेतले.

याचवेळी उत्तर भारतातील प्रभावशाली व सामर्थ्यवान राजा हर्षवर्धन याचे आक्रमण झाले; परंतु या झालेल्या युद्धात हर्षवर्धनचा पराभव करून चालुक्य राजा दुसरा पुलकेशीने आपले श्रेष्ठत्व सिद्ध  केले. ऐहोळ येथील शिलालेखात रवि कीर्ती याने दुस-या पुलकेशीवर मिळवलेल्या विजयाची माहिती मिळते. यानंतर त्याने कलिंग व कोसल हे देश ही जिंकले.

पल्लव राजा नरेंद्रसिंह वर्मा याने पुलकेशीचा पराभव केला व या युद्धात दवितीय पुलकेशी मारला गेला. यानंतर पहिला विक्रमादित्य विनयादित्य, विजयादित्य दसरा व कीर्तीवर्मन हे राजे झाले. दसरा किर्तीवर्मन हा या घराण्यातील शेवटचा राजा होय. राष्ट्रकूट राजा कृष्ण प्रथम याने याचा पराभव करून ही सत्ता संपुष्टात आणली.

कल्याणीचे चालुक्य : - राष्ट्रकुटांनी बदामीच्या चालुक्याचा पराभव करून महाराष्ट्रात स्वत:चा एकछत्री अंमल सुरू केला. राष्ट्रकूट राजा दुसरा कर्क याच्या काळात चालुक्य मांडलिक सरदाराने (दुसरा तैलप) आपले स्वतंत्र राज्य जाहीर केले. याने चोल, चेदी, कुंतल, ओरिसा येथील राजांचा पराभव केला. या घराण्यातील सत्याश्रय, पहिला विक्रमादित्य, जयसिंह प्रथम, पहिला सोमेश्वर असे काही राजे होऊन गेले. चौथ्या सोमेश्वरच्या काळात यादवांनी यांचा पराभव करून चालुक्य सत्तेचा शेवट केला.

चालुक्यांचे योगदान : - चालुक्यांच्या दोन्ही शाखांमधील राजे हे कला, साहित्य व विद्येचे उपासक होते. अनेक विद्वान त्यांच्या दरबारात होते. चालुक्य राजांच्या काळात दक्षिणेत संस्कृत व कन्नड भाषेत मुबलक साहित्य निर्माण झाले. कवी बिल्हण चे ‘विक्रमांकदेवचरित', विज्ञानेश्वराचे, ‘मिताक्षरा', पंपाचे ‘पंपरामायण', सोमेश्वर तिसरा याचे ‘मानसोल्लास' अशा अनेक ग्रंथांची निर्मिती झाली. या काळातील वास्तुशिल्पे आजही त्यांच्या वैभवाची साक्ष देतात. बदामी, हंपी, ऐहोळ, पट्टदकल्ल, श्रवणबेळगोळ येथील मंदिरे यांच्या स्थापत्याची प्रगती दर्शवतात. ही सर्व मंदिरे द्रविड शैलीची आहेत.

चालुक्य हे वैष्णव पंथी असले तरी धर्मसहिष्णुतेचे धोरण त्यांनी अवलंबलेले दिसून येते. चालुक्यांनी सामाजिक, धार्मिक, आर्थिक व कला स्थापत्याच्या दृष्टीने केलेले कार्य उल्लेखनीय आहे.
                        
 
राष्ट्रकूट घराणे :

चालुक्य घराण्याच्या ऱ्हासानंतर इ. स. ७५३च्या सुमारास राष्ट्रकूट राजे महाराष्ट्रावर सत्तारुढ झाले. प्रारंभी हे चालुक्यांचे सामंत होते. राष्ट्रकुटांची नंदिवर्धन (अचलपूर), सातारा जिल्ह्यातील माण, व मराठवाड्यातील लातूर येथे सत्ताकेंद्रे निर्माण झाली. यापैकी लातूर येथील सत्तेने ऐतिहासिक नावलौकिकता मिळवली. त्याचा संक्षिप्त इतिहास पुढीलप्रमाणे आहे.

 राजकीय इतिहास : - दंतीदुर्ग हा या घराण्याचा संस्थापक राजा होय. प्रारंभी हा गुजरातमधील चालुक्यांचा सामंत अधिकारी होता. चालुक्यांच्या दुर्बळ उत्तराधिकारी राजांचा फायदा घेत याने आपल्या स्वतंत्र राज्याची स्थापना केली. उत्तरेस नर्मदेपासून ते दक्षिणेस तुंगभद्रेपर्यंतचा प्रदेश जिंकून आपला साम्राज्य विस्तार केला. दंतीदुर्गनंतर  त्याचा चुलता कृष्ण प्रथम हा गादीवर आला. त्याने १८ वर्षे राज्य केले व चालुक्यांची उरलेली सत्ता समूळ नष्ट केली. कृष्ण प्रथम या राजाने जगप्रसिद्ध असलेले वेरूळ येथील कैलास मंदिर बांधले. यावरूनच त्याची वैभवता व संपन्नता दिसून येते.

राजा कृष्णनंतर त्याचा ज्येष्ठ पुत्र गोविंद दुसरा व त्यानंतर राजा ध्रुव (ध्रुवधारावर्ष) हे गादीवर आले. याने आपल्या १३ वर्षांच्या काळात राष्ट्रकुटांचा उत्तर भारतात प्रभाव वाढवला. यानंतर राजा बनलेल्या गोविंद तिसरा याने कन्नोजचा सम्राट नागभट्ट व त्याच्या  मित्र संघावर हल्ला करून त्यांचा पराभव केला. याने उत्तर भारतातील अनेक राजांना मांडलिक बनवून त्यांच्याकडून खंडण्या वसूल केल्या. अमोघवर्ष हा एक साहित्यिक व शांतताप्रिय राष्ट्रकूट राजा होऊन गेला. याने ‘रत्नमालिका' व 'कविराजमार्ग' या ग्रंथांची रचना केली. राजा कर्क हा राष्ट्रकुटांचा शेवटचा राजा होय. कल्याणीचे चालुक्य व परमारांनी केलेल्या आक्रमणामुळे राष्ट्रकुटांच्या सत्तेचा -हास झाला.

 आर्थिक जीवन : - शेती हा या काळातील प्रमुख व्यवसाय होता. भूमी ही राजाच्या मालकीची असे. शेतसारा/महसूल हे राजाच्या उत्पन्नाचे प्रमुख साधन असल्याने त्याची मोजणी, पाणीपुरवठा, पतपुरवठा यासाठी राजाकडून मदतीची उदाहरणे मिळतात. कापूस, गूळ, कापड, मातीची भांडी, धातूच्या वस्तू अशा अनेक गोष्टींचा व्यापार केला जाई. या काळात अंतर्गत व परकीय व्यापारात भरभराट झाल्याचे दिसून येते.

धार्मिक परिस्थिती : - राष्ट्रकूट राजे हे जैन धर्माचे अनुयायी होते. तरीही त्यांनी हिंदू मंदिरे बांधून शैव व वैष्णव धर्मालाही राजाश्रय दिलेला होता. बौद्ध विहार बांधल्याचेही दाखले मिळतात. थोडक्यात, राष्ट्रकूट राजे हे धार्मिक दृष्ट्या सहिष्णुता बाळगणारे होते.

सामाजिक परिस्थिती : - चातुर्वर्ण्य व जातिव्यवस्था या काळातही होती. या काळात जातिव्यवस्था तीव्र असल्याचे दिसून येते. एकत्रित कुटुंब पद्धती या काळात अस्तित्वात होती. ब्राम्हण, क्षत्रिय, वैश्य व शूद्र अशा चार जाती व तिच्या पोटजातींमध्ये हा समाज विभागला गेला होता. आंतरजातीय व एक गोत्र विवाह होत नसे. या काळातील लोक गहू, ज्वारी, बाजरी, नाचणी, तांदूळ, मूग इत्यादी अन्नाचे सेवन करत तसेच मासाहारही करत.

कला व स्थापत्य : - राष्ट्रकूट काळात कला व स्थापत्य क्षेत्रामध्ये उल्लेखनीय प्रगती झाल्याचे तत्कालीन मंदिर व शिल्पातून दिसून येते. वेरूळचे कैलास लेणे हे एकाश्म दगडात कोरलेले व जगप्रसिद्ध असलेले मोठे लेणे होय.

थोडक्यात, राष्ट्रकुटांच्या काळात महाराष्ट्राची सामाजिक, आर्थिक व सांस्कृतिक प्रगती झाल्याचे स्पष्ट होते.



वेरूळचे कैलास लेणे
                                
 शिलाहार घराणे :

 शिलाहार राजे प्रथम राष्ट्रकुटांचे व नंतर चालुक्य व यादवांचे अंकित झाले. चालुक्य राजा दुस-या पुलकेशीने आपला मुलगा चंद्रादित्य यास सामंत म्हणून इ. स. ६३० च्या सुमारास नेमले व चांदोर (सध्याचे चंद्रपूर) ही राजधानी बनवली. इ. स. ७६५ च्या सुमारास राष्ट्रकूट राजा कृष्ण प्रथमने हा भाग जिंकून शिलाहारांना येथील सामंत म्हणून नेमले. शिलाहारांनी गोमंतक येथील वलीपट्टण येथे आपली राजधानी बनवली. शिलाहारांची महाराष्ट्रात दक्षिण कोकण, उत्तर कोकण (ठाणे) आणि कोल्हापूर या तीन ठिकाणी सत्ता केंद्रे निर्माण झाली.

दक्षिण कोकणचे शिलाहार  :- या घराण्याचा मूळ संस्थापक विद्याधर जीमुतवाहन हा असून तो उस्मानाबाद जिल्ह्यातील तगर (तेर) हे याचे मूळ स्थान होय. सोनेरी गरुड पक्ष्याचे चिन्ह' हे जीमुतवाहन राजघराण्याच्या निशाण्यावर असल्याचे दिसून येते. सणफुल्ल, धम्मीयार, अवसर पहिला, इंद्रराज, अवसर तिसरा, रठ्ठराज असे काही राजे या घराण्यात होऊन गेले. खारेपाटण ताम्रपटातील रठ्ठराज हा शेवटचा राजा असल्याचे दिसून येते.

उत्तर कोकणचे शिलाहार : - दक्षिण कोकणातील शिलाहारापेक्षा कमी प्राचीन असलेले घराणे म्हणजे उत्तर कोकणचे शिलाहार होय. कपर्दी' हा या घराण्याचा मूळ पुरुष होय. प्रारंभी हा राष्ट्रकुटांचा मांडलिक होता. या घराण्यातील राजांमध्ये पुल्लशक्ती, झंझ, पहिला व दुसरा वज्जड, छित्तराज, अपरार्क पहिला, मल्लिकार्जुन व सोमेश्वर असे अनेक राजे होऊन गेले. उत्तर कोकणच्या शिलाहार राजांची प्रथम राजधानी दण्डराजापुरी नंतर ठाणे व काही काळ घारापुरी येथे वास्तव्यास असल्याचे संकेत मिळतात.

कोल्हापूरचे शिलाहार : - शिलाहारांचे तिसरे घराणे कोल्हापूर, मिरज, क-हाड व कोकणच्या काही भागांवर राज्य करत होते. सुवर्ण गरुड ध्वजाचे चिन्ह यांनीही राजघराण्याची निशाणी म्हणून वापरल्याचे दिसते. जतिग हा या घराण्याचा मूळ पुरुष असून तो प्रारंभी राष्ट्रकुटांचा  माडलिक होता. या घराण्यातील अन्य राजांमध्ये न्यायवर्मा, चंद्र, जतिक दुसरा, मारसिंह, दुसरा गुहल, पहिला भोज, बल्लाळ, गडरादित्य, विजयादित्य व दुसरा भोज असे राजे होऊन गेले.

दुसरा भोज हा या घराण्यातील प्रसिद्ध राजा होऊन गेला. त्याने कोल्हापूर, वळिवडे व पन्हाळा या राजधान्या बनवल्याचा उल्लेख शिलालेखात सापडतो. याने दान दिल्याचा एक शिलालेख कोल्हापूरच्या अंबाबाईच्या मंदिरात असून त्याची लिपी देवनागरी व भाषा संस्कृत आहे. याने बावडा, भुदरगड, खेळणा, पन्हाळा, पावनगडे, सामनगड व वाईजवळील पांडवगड असे पंधरा किल्ले बांधल्याचा उल्लेख सापडतो.

शिलाहारांचे योगदान : - शिलाहारकालीन समाज हा ब्राम्हण, क्षत्रिय, वैश्य व शुद्र या जातींमध्ये विभागला होता. जातीनिहाय व्यवसाय केले जात. भोजनामध्ये शाकाहारी व मांसाहारी अन्नाचा समावेश असे. सुतार, लोहार, कुंभार, चांभार, पाथरट यांच्या उदयोगाबरोबरच धातू उद्योग, कापड उद्योग , हस्तिदंती उद्योगही या काळात चालत असत. शेती हा या काळातील लोकांचा प्रमुख व्यवसाय होता.

 शिलाहार राजे जैन धर्माचे अनुयायी होते. यांनी कोल्हापूर, खिद्रापूर येथे जैन मंदिरे बांधल्याचे उल्लेख मिळतात. हे धर्मसहिष्णू राजे होते. त्यांनी हिंदू धर्मीयांसाठी मंदिरे व बौद्ध भिख्खूच्या निवासासाठी विहारे बांधली. अशा प्रकारे शिलाहार राजांनी सामाजिक, आर्थिक, धार्मिक व सांस्कृतिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केले.
                                       
 गोड घराणे :

प्राचीन महाराष्ट्रामध्ये शेवटच्या काळात हूण व मुस्लिम आक्रमणांमुळे महाराष्ट्रामध्ये राजकीय अस्थिरता निर्माण झाली. या वेळी महाराष्ट्रात यादवांनी देवगिरी येथे आपली सत्ता प्रस्थापित केली. याच काळात चांदा (चंद्रपूर) येथे गोंड घराण्याने आपली सत्ता प्रस्थापित केली..

ऐतिहासिक साधने  : - १८६९ मध्ये मेजर ल्युसी स्मिथने गोंड घराण्याच्या इतिहासावर सर्वप्रथम प्रकाश टाकला. यांनी स्थानिक परंपरा, हस्तलिखिते व मौखिक साधनांद्वारे हा इतिहास लिहिला. शिलालेख व इतर साहित्यिक साधनांद्वारेही गोंड घराण्याच्या इतिहासावर प्रकाश पडतो.

राजकीय परिस्थिती : - कोल भील हा या घराण्याचा संस्थापक होय. त्याने विखुरलेल्या गोंड जमातीला एकत्र करण्याचे व नाग वंशीयांविरुद्ध लढा देण्याचे तंत्र शिकवण्याचे काम केले. भीम बल्लाळ सिंहापासून गोंडांचा इतिहास लिखित स्वरूपात पाहावयास मिळतो. याने शिरपूर येथे राजधानी हलवली. केशरसिंगाच्या काळात यांच्या साम्राज्याचा विस्तार भिल्ल देशापर्यंत झाला. या राजांच्या काळात गोंड घराण्याचा सर्वाधिक संपन्नतेचा काळ होता. घोडे व बैल यांच्या संख्येतही या काळात वाढ झाली. दिनकर सिंग हा एक 'शांतताप्रिय, कला, विद्या व साहित्याचा भोक्ता असलेला राजा होउन  गेला. अनेक कवी व विद्वानांना याने आपल्या दरबारात आश्रय दिला नंतरच्या काळात सुर्जा बल्लाळ सिग हा महत्त्वपूर्ण राजा होऊन गेला त्याने बनारस व लखनऊ येथे जाऊन युद्ध व संगीत (गाणे) या कलांचे शिक्षण घेतले.

 खांडख्या बल्लाळ शाहने १४३७-१४६२ पर्यंत राज्य केले हा त्वचारोगाने त्रासला होता. पत्नीच्या सल्याने बल्लाळपूर येथे तो किल्ला बांधून राहू लागला व राजधानीचे शिरपूरहून बल्लाळपूर येथे स्थलांतर केले. तसेच याने अचलेश्वराचे मंदिर बांधले. गादीवर आलेल्या हिरशाह याने मंदिराच्या तटबंदीचे काम पूर्ण केले. याने जंगले स्वच्छ करून जनतेला राहण्यासाठी वस्तीची सोय करून दिली, कृष्ण शाह, बीर शाह, गोविंद शाह, हिराई, राम शाह, नीलकंठ शाह, असे राजे होऊन गेले.

 नीलकंठ शाहच्या काळात चांदा प्रातावर रघुजी भोसले आक्रमण झाले व त्याला रघुजी भोसल्यांनी कैद केले. कैदेतच त्याचा मृत्यू झाला व नागपूरच्या रघुजी भोसलेच्या प्रदेशात हा भाग समाविष्ट करण्यात आला.

गोंड घराण्याचे योगदान : - ६२ गोंड राजांनी अनेक शतके महाराष्ट्रातील देवगड, नागपूर, चंद्रपूर या प्रदेशांवर राज्य केले.

 गोंड राजे हे कला, साहित्य व विद्येचे भोक्ते होते. त्यांनी आदिवासी जमातीतील लोकांना संघटित केले. त्यांना लष्करी प्रशिक्षण दिले. तसेच त्यांचा विकास घडवून आणला. एकंदरीत आदिवासी समाजाला इतिहासात स्थान मिळवून देण्याचे काम गोंडांनी केले. म्हणूनच यांच्या वैभवशाली कालखंडाची नोंद इतिहासात होणे आवश्यक ठरते.

खानदेशातील मध्य पुराश्मयुग
पुर्व पुराश्मयुगीन खानदेशातील दुसरे स्थान म्हणजे भाडणे हे होय. हे धुळे जिल्ह्यातील कान नदीच्या काठावर साक्री तालुक्यातील आहे. कान ही पांजरा नदीची उपनदी आहे, पांजरा तापी नदीची उपनदी आहे. एस.ए. साळी यांनी १९७८ मध्ये या स्थळाचा शोध लावला आणि बारा मीटर उंचीचे चार गाळाचे ढिगारे बघितले. तीन वेगवेगळ्या थर असलेली होय. तिथे सापडलेली अश्युलियन अवजारे सर्वात खालच्या थरात सापडली ती बरीच सुस्थितीत होती आणि बसाल्ट आणि डोलेराइट या दगडापासून बनवलेले आहेत.
महाराष्ट्रातील महत्त्वाचे स्थळ ज्यापासून पुर्व पुराश्मयुगीन अभ्यास सुरू झाला ते म्हणजे गोदावरी नदीच्या खोऱ्यातील चिरकी नाला जो प्रवरा नदीच्या काठावर आहे. नेवासा जे अहमदनगर जिल्ह्यातील ठिकाण आहे. याशिवाय मध्य पुराश्मयुगातील रनाळे आणि रायगड ही तापीच्या खोऱ्यात नंदुरबार जिल्ह्यातील महत्त्वाच्या फॅक्टरी साईट आहे, येथे ताच्येलाईट लाल रंगाची बारीक बसाल्टचा वापर केला आहे.
खानदेशातील मध्य पुराश्मयुग
हा काळ पुर्व पुराश्मयुगाचाच सलग असतो, या काळातील भारतीय अवजारे ही आकाराने लहान, उत्कृष्ठ पोताची दगड वापरलेली, बारीक बारीक छिलके काढून संस्कार केलेली आढळून येतात, त्याचे प्रकार म्हणजे तासण्या, नोक हत्यारे, क्षुद्र छिन्नी किंवा उत्किर्णक होय. या काळात अवजारे ही छिलक्यापासून बनवली जात आणि निअंडरथल मानव अस्तित्वात होता.
मध्यपुराश्मयुगातील मानव युरोपातील उपलब्ध पुराव्यानुसार समाज निर्माण झाल्याचे दिसून येते. या काळात हवामान अत्यंत थंड असल्याने तत्कालीन मानवाला झोंबणार्‍या गार वाऱ्यापासून बचाव करण्यासाठी उघड्यावर राहण्याऐवजी नैसर्गिक मध्ये किंवा नैसर्गिक सारखा पुढे आलेल्या खडकाचा आश्रय घेऊन राहावे लागले आणि अनेक गट एकत्र आल्याने कदाचित निरनिराळ्या गटांमध्ये एकत्र समाजाची भावना निर्माण झाली असावी. कदाचित प्राथमिक कुटुंब संस्थेचा उगम झाला असावा आणि या भावनेतूनच मृत व्यक्तीचे अत्यंत काळजीपूर्वक करण्याची प्रथा या काळात प्रचलित झाली असावी. कुटुंबसंस्थेतूनच मग प्रेम भावना निर्माण होते आणि त्यामुळे हे प्रेम मृत्यूनंतरही कायम टिकावे म्हणून काळजी घेतली जाते. या काळात फ्रान्स, चीन, पॅलेस्टाईन येथील लहान मुलांची अत्यंत काळजीपूर्वक केलेली दफने साक्ष देतात. त्या काळात आकाराने लहान परंतु अत्यंत काळजीपूर्वक व रंगीबेरंगी दगडांची केलेली अवजारे आढळतात.
मध्यपुराश्मयुगात युरोप मधील मानव नैसर्गिक गुहा तसेच शैलाश्रयाने रहात होता, चीनमधील चौकुतीन गुहांमध्ये मानवी कुटुंब एकत्र रहात असल्याचे दिसून येते.‌
१९५४ साली सांकलिया यांनी पहिल्यांदा प्रवरा गोदावरी नदीच्या खोऱ्यात तासण्या, तिराग्रे आणि वेधण्या आढळून आले. विशेषतः खालील बाबींचा समावेश याकाळाचा अंदाज घेण्यासाठी केला जातो. अर्थातच हा टप्पा पुर्वपुराश्मकाळ आणि उत्तर पुराश्मकाळातील आहे. कुठल्या प्रकारचे अवजारे सापडतात? ते बनवण्याचे तंत्र काय होते? काही स्थळांवर समध्वय दिसतो का? अर्थातच तुलनात्मक अभ्यास, अवजारांचा वापर कशासाठी होत होता? काय मटेरीयल वापरलेले आहे. ? स्तरवार उत्खननात कोणत्या थरात सापडली आहेत? स्थळांचा प्रकार काय आहे? नदीच्या खोऱ्यात, फक्टरी साईट, डोंगरावर की सपाट जमीनीवर होय. त्या स्थळावरील त्याकाळातील पर्यावरण काय होते? त्याचा मानवी जीवनात काय परिणाम झाला वगैरे वगैरे.
महाराष्ट्रातील पश्चिम महाराष्ट्रात ठिकाणी झालेल्या अभ्यासातील रेडीओ कार्बन कालमापन पध्दतीने काळ इसवीसन पुर्व ४०,०००-१०'००० एवढा मोठा आहे. या साठी पाण्यातील शिंपले, अर्ध कार्बनाईज झालेले लाकुड आणि हाडे हे मटेरीयल वापरलेले आहेत. थर्मोल्युसन्स आणि युरेनियम/ थोरीयम पध्दतीने काढलेल्या काळाचा तारखा राजस्थान येथील मध्य पुराश्मयुग १,५०,००० ते १००,००० एवढा येतो. महाराष्ट्रातील चिरकीनाला प्रवरा अहमदनगर जिल्हा, वाडोलीवाघोली हे गोदावरी नदीच्या खोऱ्यातील औरंगाबाद जिल्हा, पाटणे आडनाला जळगाव जिल्ह्यातील, महाराष्ट्रात प्रातिनिधिक समजले जाणारे म्हणजे नेवासा आणि पाटणे ही दोन स्थळे आहेत.
कार्बन २४ या कालमापन पद्धतीच्या सहाय्याने पूर्व पुराश्मयुगाचा भारतातील काळ निश्चितपणे आज पासून एक लक्ष वर्ष एवढा होता, काही ठिकाणी तो १४ लक्ष तसेच त्याच्याही मागे जाण्याची सुद्धा शक्यता आहे. भुगर्भ शास्त्राच्या परिभाषेत तो पूर्व ते मध्य प्लायस्टोसीन युगा इतका आहे तर मध्य पुराश्मयुगाचा काळ हा मध्यप्लायस्टोसीन ते उत्तर प्लायस्टोसीन म्हणजे आज पासून एक लाख वर्ष पूर्व ते ४० हजार वर्ष पूर्व एवढा होतो. या काळात पर्यावरणाच्या दृष्टीने महत्वाचे बदल घडून आले असे भूगर्भ शास्त्रज्ञ मानतात. पृथ्वी दुसऱ्या अंतरहिमाचा अनुभव घेत होती असे दिसते. पर्यावरणात झालेल्या या फरकामुळे मात्र प्रत्यक्षात जीवसृष्टी आणि हवामान यात फरक पडलेला दिसत नाही.कदाचित तेव्हापासून मानवाच्या मेंदूमध्ये अधिक प्रगल्भता निर्माण झाली असल्यामुळे त्यांची हत्यारे प्रगत तंत्राची आणि जास्त कौशल्यपूर्ण अशी होती. मोठ्या आकाराच्या हात कुऱ्हाड किंवा त्यांच्या अभावी मध्यपुराश्मयुगात मानवाने कठीण दगडाचा जास्त सुबक तंत्रान घडवलेल्या तासण्या, बाणांची टोके, गिरमिटे, पाती, चाकु इत्यादींचा अंतर्भाव असलेले प्रभावी हत्यारे तयार केली. या हत्यारांचे वैशिष्ट्य असे होते की लहान-लहान घडवलेल्या चिपा एका मोठ्या लाकडाच्या अथवा हाडाच्या खोबणीत बसवून त्यापासून त्याचे एक मोठे हत्यार तयार केलेले दिसते. दुसरे असे की अवजडपणा जाऊन आकारात सुटसुटीतपणा आल्याने हत्यारांचा पल्ला वाढला आणि त्याच्यात अचूकता आली आणि ती अधिक परिणामकारक रित्या शिकार करण्यासाठी वापरता आली. जनावरांच्या कळपात पिटाळत नेऊन उंच ठिकाणावरून खाली हाकलत पाडून मारण्याच्या शिकारीच्या तंत्राबरोबरच परिणामकारक रित्या प्राणी किंवा पक्षी यांचे यशस्वी शिकारी तंत्र मानवाने आत्मसात केले, या दगडाच्या उपयोग बनवण्यासाठी उपयोग झाला.
पुरातत्त्वज्ञ एस ए. साळी यांच्यामते मध्यपुराश्मयुगाचे सुरुवातीच्या काळात जे काही भूगर्भातील प्रचंड स्थित्यंतरे ज्याला टेक्टनिक मोवहमेंट्स म्हटले जाते. त्याचे परिणाम तापी खोऱ्यात ही झाले. आणि त्याच काळात पाटणाच्या दक्षिणेला अजिंठा डोंगराच्या पायथ्याशी एक खोलगट भाग तयार झाला. अनेक दृष्टीने सुरक्षितता लाभलेल्या या भागात चाळीस हजार वर्षापासून म्हणजे मध्य पुराश्म काळात च्या शेवटच्या काळापासून ते उत्तर पुराश्म काळात या भागात मानव वस्ती करून राहू लागला. या युगातील मानवी वसाहतींचे पुरावे दर्शवणारे पाटणे हे एक स्थान आहे. या काळातील पाषाण आयुधे ही पाटणे येथे सापडली आहेत.
मध्य पुराश्मयुग, उत्तर पुराश्मयुग आणि मध्याश्मयुगात म्हणजे काळात या भागात महत्त्व आहे. या उत्खनन स्थानामध्ये पाटणे विशेष महत्वाचे आहे. पाटणे अजिंठा डोंगराच्या पायथ्याशी तीन बाजूंनी डोंगर कडा असलेल्या वर्तुळाकार दीर्घ नाट्यशाळे सारख्या खोऱ्यात आहे. या भागातील भुस्तरात कंकर म्हणजे दगड गोटे, गाळ, वाळू व मातीचा अंदाजे १० ते २० मीटर थर आहे. या थरात एस.ए. साळी यांनी दोन वेळा उत्खनन केले. त्यात त्यांना भुविज्ञानविषयक तेरा थर आढळले. त्यात सर्वात खालचा थर हा मध्य पुराश्म युगातील असून त्यातील आठ थर उत्तर पुराश्म युगातील आहे. सर्वात वरचे चार थर हे मध्याश्मयुगातील असल्याचे सिद्ध झाले आहे. उत्तर पुराश्म युगातील आठ थरांची जाडी एकूण ५.५ मीटर असून क्रमांक पाच आणि सात वर मानवनिर्मित कला वस्तूंची समृद्ध आहेत आणि त्यांच्यात अनुक्रमे ११,७८८ आणि १२३०३ एवढे विविध नमुने आढळले आहेत, तसेच उत्तर पुराश्म युगातील शहामृगाच्या अंड्यांची शंभराहून अधिक नमुने सापडले आहेत. त्यातील तीन नमुने उत्तर पुराश्म युगातील असून अंड्याच्या कवचावर जाळीची नक्षी दिसून येते. या ठिकाणी शहामृगाच्या अंड्यापासून बनवलेले तीन चपटे मणी आणि नदीच्या मुखाजवळील प्रदेशात शंखा पासून बनवलेल्या मण्यांचेही नमुने सापडले आहेत. ते उत्तर पुराश्म युगातील आहे, या काळातील मानवी कलावंत एकत्रित वसाहत करून रहात असल्याचा सर्वात मोठा आधीचा पुरावा मानला जातो.
मध्य पुराश्म युगातील अणुकुचीदार हत्यारांचा वापर मानवाच्या सुरुवातीच्या अवस्था दाखवतो. उत्तर पुराश्म युगातील काळात मानव जा स्वर दगडापासून हत्यारे बनवी तर याच काळातील नंतरच्या काळात मानव म्हणजे पांढरा चकचकीत दगड किंवा गार यापासून हत्यारे बनू लागला. नंतरची हत्यारे त्याच्या अर्धचंद्राकार, विषम, चतुर्भुज व त्रिकोणी आकारावरून ओळखता येतात. या भागात मध्य पुराश्मयुगा पासून ते मध्याश्मयुग म्हणजेच मेझोलिथिक काळा पर्यंतचे भूस्तर विज्ञान विषयक मानवी अवशेषांचे स्पष्ट पुरावे आढळून आल्याने पाटणे स्थानास असाधारण महत्त्व प्राप्त झाले. मध्य पुराश्म व उत्तर पुराश्मयुगामधील अवशेषांप्रमाणेच त्यानंतर येणारी अवस्था म्हणजे मध्याश्म युगातील जे मेझोलीथिक कल्चर म्हटले जाते,त्याचेही पुरावे पाटणे येथे मिळाले आहे. मध्याश्मयुगाचेही तीन कालखंड मानले जातात. असे पाच कालखंड साळी यांनी पाटणेच्या संदर्भात मांडले आहे. अर्थातच हे उत्तर पुराश्मकाळानंतरचे होय.
पहिला कालखंड हा उत्तर पुराश्मकाळानंतरच्या काळात यात विविध प्रकारच्या पाती आणि विविध टोकांची अश्मयुगीन हत्यारे सापडतात. दुसरा कालखंडात बरेच बदल दिसून येतात, यात कोळशांचे बारीक तुकडे आणि भाजलेल्या मातीचे पुरावे दिसतात तर शेकोटी आणि स्तंभछिद्रांचे अस्तित्व दिसते. वाऱ्याने उडून आलेल्या मातीतील निक्षेपात भुस्तरावरील भाजक्या विटांसारखे पट्टेही दिसतात.
तिसऱ्या कालखंडात मध्याश्मयुगातील तीनही कालखंड पाटणे येथे दिसतात. एकंदर आद्य पुराश्मयुग इसवी सन पूर्व दिड लाख वर्षे ते एक लाख वर्षांपूर्वी, मध्याश्म पुराश्मयुग इसवी सन पूर्व एक लाख ते तीस हजार वर्षे आणि उत्तर पुराश्मयुगात इसवी सनपूर्व तीस हजार ते दहा हजार वर्ष, मध्याश्मयुग इसवी सन पूर्व दहा हजार ते चार हजार वर्षे आणि नवाश्मयुग इसवी सन पूर्व चार हजार ते दोन हजार सातशे वर्षे अशा या पाच अवस्था आहेत. पाटणे भागात उत्तर पुराश्म युगातील म्हणजे तीस हजार वर्षापूर्वी मानवी वस्ती असल्याचे पुरावे उपलब्ध आहेत म्हणूनच पुरातत्त्वज्ञ एस.ए. साळी यांच्या मते तीस हजार वर्षाच्या काळात हवामानात विषयक महत्त्वाचे बदल घडून आले नसले तरी परिस्थितीत निश्चित बदल होत गेले आणि नदीला त्यांनी वाहून आणलेला गाळ पसरून मैदानी भाग तयार झाला. गवत आणि वनस्पती उगवल्या, हत्यारे तयार करण्यासाठी गारांचे दगड त्या खडकात मुबलक उपलब्ध होते. नदी नाल्यात काही ठिकाणी डोह निर्माण झाले. मैदानी प्रदेशात गवताळ भागात शहामृग तसेच मोरासारखे मोठे पक्षी व घोडे यांसारखे प्राणी राहत. अशा परिस्थितीत सातमाळा डोंगराच्या पायथ्याशी मानवाने आपले गावठाण स्थापन केले, या पाच अवस्था वरून हळूहळू कसा विकास होत गेला हे लक्षात येते.
( एस. ए. साळी यांनी रघुनंदन या चाळीसगाव येथील मासिकात " पाटण्यातील मानवी जिवनाची तीस हजार वर्षे" १९८८ मधील लेखात सविस्तर लिहिले आहे. तसेच "दि अप्पर पॅलिओलिथिक कल्चर ऑफ पाटणे, डिस्टिक जलगाव, महाराष्ट्र" यालेखात तसेच "रिसेंट ॲडव्हान्सेस इन इंडो पॅसिफिक हिस्टरी, १९८५, या लेखात आर. एस. पप्पू यांनी लिहिले आहे. "स्टोन कल्चर ऑफ महाराष्ट्र" महाराष्ट्र स्टेट गॅझेट मध्ये तर, हिस्टरी: एन्शंट पिरीयड, यात तोकडीच माहिती आहे असे म्हणायला हरकत नाही. पुरातत्त्वज्ञ साळी यांनी या भागात १९७१ ते १९७५ असे दोन वेळा उत्खनन करून सलग तेरा वर्षे संशोधन केले आहे.)
©सरला भिरूड
गोकर्ण महाबळेश्वर येथील शिळावर्तुळ






Usgalimal Goa


Discovering Goa’s Ancient Secret ✨
Goa is known for its beaches, but did you know it’s also home to one of India’s richest rock engraving sites?
Located on the serene banks of the River Kushawati in Sanguem Taluka, this historic site showcases stunning prehistoric petroglyphs — from human and animal figures to a striking labyrinth (चक्रव्यूह) pattern.
In Marathi, we call these carvings “कातळशिल्प”, and they’re believed to be thousands of years old, offering a rare glimpse into the minds and lives of our ancestors.
A truly unique, informative, and awe-inspiring place that proves Goa is more than just sand and sea.
“Far from the crowds, yet so close to our roots


Maharashtra: '2,000-year-old Sangli labyrinth to be conserved'

Rahul Gayakwad

Maharashtra: '2,000-year-old Sangli labyrinth to be conserved'

The site of stone labyrinths, which illustrates the footsteps of ancient Indo-Roman culture at Aitawde Budruk in Walva taluka. Photo: Rahul Gayakwad/TOI

SANGLI: Guardian minister of Sangli Jayant Patil visited the site of ancient labyrinth in Walva taluka, of Sangli district, and assured that its conservation would be done through the state archaeology department, in coordination with Archaeological Survey of India (ASI). MLA Mansing Naik was also present.
Patil said: "These stone labyrinths illustrate the existence of ancient Indo-Roman culture at Aitawde Budruk in Walva taluka."
According to the archaeological study presented by Sachin Patil, foreign trade had been taking place in this area even in the third century BC.

It is also evident that Greco-Roman merchants came here and the symbol on their coins and the layout of this stone labyrinth is similar.
"There are historical references to the arrival of foreign traders in Kolhapur, Karad and Ter in western Maharashtra. The state is ready to help in the conservation of all the newly discovered ancient heritage sites and such symbols in Maharashtra," added Jayant Patil.

Head of archaeological department at the Deccan College Research Institute and Deemed University in Pune, Dr P D Sabale, said, "More labyrinths are expected to be there in Shahuwadi, Radhanagari, Bhudargad and Gaganbawda region and if people come across such rare stone formations, then they should preserve them for further research. These labyrinths in Sangli still are rarely explored and await proper conservation as per the archaeological norms."

https://timesofindia.indiatimes.com/city/kolhapur/maharashtra-2000-year-old-sangli-labyrinth-to-be-conserved/articleshow/91364130.cms

Posts Tagged With: Krishnagiri District

Ancient Adaptabilities

Day 166:  June 15
In The Year of Living Honestly
In The Quarter of: Education
In The Month of: Exploration

The 2,500 year old labyrinth of Horus in the Krishnagiri District of Southern India. Photo Credits: Times of India

Estimated at being 2,500 years old, the discovery of a circular labyrinth was made only a year before of an ancient labyrinth design by two researchers that was observed in our exploration for yesterday. This  design may be 500 years older and sits at approximately 700 square feet in area, making it another megalithic reward.

This labyrinth is located only two hours north of the other ancient labyrinth in the forested town of Horus in the Krishnagiri district  of Southern India. It is a place where gardens are not overrun by rabbits, but trampled annually by elephants to give some perspective of the area and Indian culture.

This circle of stones was found in a simple and obscure community used unknowingly in ceremony and ritual by its members adopting it in a prayerful way and adding it to their way of life. Its natural wonder and wisdom must have appealed to the community to simply adjust by using it and thereby gaining in understanding rather than clearing it in the name of progress. The labyrinth existed  before any of its inhabitants giving it a sense of greater appreciation and respect perhaps.

On this 166th day…
Explore what you have learned to adapt to instead of change and how it has made you more as a result.

 

Interactive Map Progress
A great Interactive experience this month will include a google map to track where we have been and what labyrinths you submit. Lets see if we can make a labyrinth pathway out of the month of travels based on the locations offered.  We began in Portland, Oregon…. Click here to watch the progress grow this month!

 


June Banner 2018 TLS 365 Experience World Wide Wonder

Welcome June

Our exploration this month is to discover the World Wide Wow in the unique and innovative labyrinth designs world wide that inspire us to move beyond the everyday and give us a larger labyrinthic look at what our path can truly provide. From the idea of living outside your box to simply doing something different everyday, allow this journey of June to educate you and your relationship to life with the labyrinth. We’e taking a global course in Labyrinthing!

  1. Get Global….Explore the World
    Investigate the world wonders of labyrinth design that are unique and different. From the permanent structures that are built to the canvas portable unique designs or the finger labyrinths that inspire a different walk, share the images at the 365 Experience on the TLS website and provide some detail and share your thoughts. Note how these designs are  outside the box of traditional design and how they might take us outside the design we’ve been living in.  They can be quite diverse or small simple adjustments that make it different too.
  2. Act Local…. Bring the World to you
    Let your walks, programs, designs, creations and simple enthusiasm be inspired by what the world offers us with fresh ways to create new experiences in the 30 days of this month. If it is doing something different each day, walking a new labyrinth, designing, researching or some new way to share, do it then share it with us! By becoming acquainted with the unique labyrinths of the world, we can be inspired as to why they are different, how they serve and what they offer on the same path we walk on in our home or local community area.
  3. Join the online  Mid Month Dialogues Call on Friday June 15th at 2pmPST
    Be curious, research and share what you know of unique world labyrinths in the first half of the month and apply something that you find unique to your own life walk. Join us on the Mid Month Dialogues to share what you discovered, ask questions and hear from others about what they explored and discovered. Be inspired with an insight to complete the month with and make June a true world Journey.  Call connection Information
https://tls365experience.wordpress.com/tag/krishnagiri-district/






















No comments:

Post a Comment

मनसर

 प्रकार : गिरीदुर्ग जिल्हा : नागपुर उंची : १२०० फुट ...