१२ महिने २४ तास श्रावण पाळणारं गाव, मंदिरातून दिसते शिखर शिंगणापूरची झलक!
Shravan 2023 : आपल्या देशातल्या प्रत्येक राज्याचं काही ना काही खास वैशिष्ट्य आहे. राजस्थानाला ऐतिहासीक तर केरळला देवभूमी म्हटलं जातं. तसंच आपल्या महाराष्ट्राला पुरोगामी राज्य म्हटलं तर वावग ठरणार नाही. महाराष्ट्रात अनेक संत होऊन गेले. त्यांचे विचार जूने झाले म्हणजे ते मागे पडले असे नाही. तर त्याच संत महाराजांनी रूजवलेले विचार आजही श्रद्धेने पाळले जातात.
जिथ लोक श्रावण कधी संपतोय अन् आपण कधी मटणावर तुटून पडतोय असा विचार करत आहेत. तर अशात नेहमीच श्रावण पाळणारे एक गाव आहे. ज्या गावातील लोक मासांहार करणे तर सोडाच पण त्याचा विचारही करत नाहीत. हे काही विशिष्ट महिना किंवा वर्षभराच्या रितीप्रमाणे नाही. तर जन्म झाल्यापासून मृत्यूपर्यंत या गावातील लोक मासांहार करत नाहीत.
हे गाव आहे सांगली जिल्ह्यातील विटा तालूक्यातील रेणावी. या गावातील लोक मांसाहारापासून दूर असतात. ते केवळ या गावची प्रथा आहे म्हणूनच. या गावात नवनाथांपैकी एक असलेले श्री रेवणसिद्ध महाराजांचे भव्य मंदिर आहे. (Sangli)
देवस्थान प्रशस्त असून बांधकाम पूर्णपणे दगडांमध्ये करण्यात आलेलं आहे. डोंगरदऱ्या आणि दाट वनराईने हा परिसर वेढलेला आहे. इथे कधी-कधी कोल्हा, काळवीट, हरीण अशा वन्यप्राण्यांचेही दर्शन होते.
सह्याद्री पर्वतावर असलेल्या डोंगररांगांची सुरूवात खानापूर तालुक्यापासून होते. त्यापैकी ‘रेवागिरी’ नावाची डोंगररांग विटा शहरापासून पूर्वेस सुरू होते. विटा शहराच्या पूर्वेस नऊ किलोमीटर अंतरावर कऱ्हाड-विजापूर रस्त्यावर दक्षिणेस रेणावी गाव आहे आणि इथेच श्री रेवणसिद्ध हे पवित्र तीर्थक्षेत्र आहे.
या वेगळ्या प्रथेबद्दल ग्रामस्थ सांगतात की, श्री रेवणसिद्ध हे मूळ पंचाचार्य पीठ आहे. रेवणसिद्ध हे नवनाथांपैकी एक आहेत. नवनाथ हे पूर्ण शाकाहारी होते. ग्रामदैवत नाथ महाराज असल्याने गावातल्या लोकांना कधीही काही कमी पडत नाही. देवांची अखंड शक्ती सकारात्मक उर्जा गावात नेहमी जाणवते. गावात कधीही भांडण-तंटे होत नाहीत. देवांसाठी आम्हीही हे संपुर्ण शाकाहाराचे व्रत केले आहे, असेही ग्रामस्थ सांगतात. (Shravan)
एखाद्याचे लग्न ठरवतानाही त्याबाबत लग्नाची बोलणी केली जाते. शाकाहारी असलेल्या कन्येची निवड केली जाते. किंवा तशी कल्पना नववधूला देऊन मगच लग्नाची सुपारी फुटते. गावात सर्व धर्मांचे लोक राहतात. प्रत्येकाने ही परंपरा जपली आहे. तिथे राहणाऱ्या ग्रामस्थांना याचं नवल वाटत नाही. ते श्रद्धा म्हणून या गोष्टी मनोभावे पाळतात.
रेवणसिद्धाची यात्रा महाशिवरात्रीपासून सुरू होते. दक्षिण महाराष्ट्रातील सर्वांत मोठी यात्रा इथे भरते आणि त्या यात्रेमध्ये लाखो रुपयांची उलाढाल होते. मंदिराच्या उत्तरेकडील प्रवेशद्वारातून दुर्बिणीतून पाहिल्यास शिखर शिंगणापूरचं दर्शन होतं, असं सांगितलं जातं. मंदिराच्या पूर्वेला एक किलोमीटर अंतरावर गायमुख आहे. रेवणसिद्ध मूर्तीसमोर भव्य असा नंदी आहे. (Temples)
दगडी गुंड
मंदिरात नंदीमहाराजांसमोर एक दगड आहे. त्याला गुंड्या म्हणतात. हाताच्या तीन बोटांनी तो दगड उचलला जातो. असं म्हणतात की, मनात असलेली इच्छा पूर्ण होणार असेल तर तो दगड तीन बोटात अलगद उचलतो. पण जर इच्छा पूर्ण होणार नसेल तर मात्र तो दगड जागचा हालतही नाही.
No comments:
Post a Comment