Saturday, August 31, 2024

History of Satara

 http://historyofsatara.blogspot.com/2009/09/blog-post_5793.html
 इसवी सनापूर्वी २०० वर्षे.......,..
आजपासून सुमारे २२०० वर्षापूर्वी,
मध्यभारतातील जबलपूर जवळच्या भारहूत स्तूपाला कराडच्या भक्तगणाने दिलेल्या देणगीचा उल्लेख आहे. सातारच्या दक्षिणेचा सुपिक प्रदेश, जिथं बौद्ध गुंफा मंदीरे आहेत-- एवढ्या दूरवर जाणा-या भक्तांचा होता. शेकडोमैलावरील मंदीराला देणगी देऊ शकणा-या दानी श्रीमंतांचा होता.
देणगीचा लेख व्हावा इतक्या योग्यतेचे श्रेष्ठी इथं होते. मग प्रदेश किती सुजलाम सुफलाम असेल? व्यापारी इतकेश्रीमंत तर सामान्यजन किती सुखी असतील?
साता-यात पैशाची देवघेव मोठ्याप्रमाणावर चालत होती. महाड, दाभोळ ,चिपळूण या बंदरातून चालणा-या व्यापाराच्या मार्गावरचे काफीले, उत्तमोत्तम माल लादलेल्या बैलांचे तांडे -- वरंधा , कुंभार्ली घाटातून, सातारच्या डोंगर द-यातून जात.
अनेक पाणपोया, थांबे, खानावळी अन व्यापारीमार्गावरच्या सुरक्षारक्षकांच्या वर्दळीनं गजबजलेला सातारा.
 

अरुणोदयापूर्वी

साडेचौदाशे वर्षांपूर्वी चालुक्यांच्या अधिपत्याखाली, हजार वर्षांपूर्वी राष्ट्रकूटांच्या छत्राखाली, आठशे वर्षांपूर्वी शिलाहारांच्या राज्यात सातारा नांदत होता.
सातशे वर्षांपूर्वी हसन गंगू बहामनीनं कुलबर्ग्य़ाच्या राजधानीतून १३४७ मध्ये बहामनी राज्य उभं केलं. १३५७ मध्ये या राज्याच्या चार "तर्फ" केल्या. प्रत्येकावर तरफदार किंवा राज्यपाल नेमण्यात आले.
सातारा कुलबर्ग्याच्या तरफेत जमा झाला.
 

पातशाही जमाना

सुमारे साडेसहाशे वर्षांपूर्वी...
मुह्म्मद शाह बहामनीच्या राज्यात व्यापारी मार्गावरील लुटारुंचा बंदोबस्त केला गेला. दख्खन शांती आणिभरभराटीच्य़ा वातावरणात भविष्याकडे आशावादी दॄष्टीने पहात होता. याच काळात सातारचा किल्ला बांधला गेला.
हुक्के बयान .... त्याचं नाव. आधीच्या बांधकामात सुधारणा केली गेली.



पुढं काळाच्या मनात काय होतं?
१३९६ ते १४०७.............
या बारा वर्षांत पावसानं तोंड फिरवलं. रानं वैराण झाली. धूळ आकाशा भिडली. वस्त्या निर्मनुष्य होत गेल्या. १०,००० बैलांच्या पाठीवरून गुजरातेतून धान्य आणवलं.
मंगळवेढ्य़ाच्या दामाजी पंतांनी बादशहाच्या परवानगी वाचून भुकेल्यांसाठी सरकारी गोदामं लुटवली. हजारोंचे प्राण वाचवले. बादशहाची इतराजी झाली. विठ्ठलानं बीदरला जाऊन रक्कम भरली, ती याच वेळी.


गावं ओसाड बनली. गुरं-ढोरं पटापट मरु लागली. रयतेनं बंड पुकारलं. दौलताबादेहून मलिक उत्तुजार खटावदेशी आला. त्यानं बंड शमवलं. बादशाही फौजा वाई पर्यंत आल्या. ही १४२६ ची गोष्ट. मलिक उत्तुजारला शिर्के आणि विशाळगडच्या शंकररायनं गनिमीकाव्यानं खिंडीत पकडून फौजेसह बुडवलं.

पहिला गनिमीकावा.

दुर्गादेवीच्या दुष्काळानं माणसं नेली. १४७४ मध्ये पाउस आला. नांगरायला गुरं नव्हती, नांगर धरायला माणसं नव्हती. 
१४८१ मध्ये युसुफ आदीलखानाने विजापूरला आदीलशाही स्थापली, सातारा आदीलशाहीला जोडले गेले.
 सातारा आदीलशाही परगण्यात तालुक्यात हरवून गेलं. अमील शेतसारा गोळा करु लागले. मोकासदार अमीलदारंवर हुकमत करु लागले. सुभा किंवा सुभेदार सातारची कायदा अन सुव्यवस्था संभाळू लागले.
किल्ल्यांवर किल्लेदार आले, जहागीरदार देशमुख वतनांवर वतनदार आले.
 सातारचे सरदार
जावळीला चंद्रराव मोरे आले, फलटणला राव नाईक निंबाळकर आले. मलवडीला झुंझारराव घाडगे आले. म्हसवडला माने आले.
 

Monday, July 5, 2010


ताम्रपट
पूर्वी महत्वाच्या आज्ञा तांब्याच्या पत्र्यावर कोरून ठेवत. तांबे ठोकून त्याचा पत्रा बनवीत. त्यावर कोरणीने कोरत असत. एकापेक्षा अधिक पत्र्यांना कडीने एकत्र करीत असत. कडीच्या जोडावर खास मुद्रा असे.
असे पत्रे कोरणारे करणिक - कुलकरणिक. त्याचे प्रमुख करणाध्यक्ष. ज्यांच्याकडे असे पत्रे सुरक्षित ठेवत ते पटलाध्यक्ष (पाटील). या दोघांसमक्ष राजा दानपत्र प्रदान करीत असे.
वळई ताम्रपट
साता-यापासून  दक्षिणपूर्वेला जिल्ह्याच्या टोकाला, भोजलिंगाच्या डोंगराजवळ, काळेलांचा गाव आहे. गाव महाराष्ट्रात मातीपासून मीठ (मेंगेमीठ) बनवणा-या समाजाचे आहे - लोणारी समाजाचे !
गावाचा देव श्री भोजलिंग. म्हसवडच्या श्री सिद्धनाथ मंदीरात इथल्या सासन काठ्या जातात. यांच्याकडे वंशपरंपरेने ताम्रपट आहे. त्याला देवाइतकाच मान.   
 
 

, July 6, 2010


वाचन
हे पहिले पृष्ठ आहे पहिल्या काही ओळी राजाच्या वंशावळी विषयी माहिती देतात. त्यानंतर पूर्वजांच्या गुणांचे वर्णन आहे. नंतर १४ ब्राह्मणांचा नाव व गोत्रासह उल्लेख आहे. त्यानंतर दान केलेल्या गावाचा उल्लेख आहे. त्याच्या चतुःसीमा आहेत. शेवटी काळ, साक्षीदार, अधिकारी यांच्या नावांच्या उल्लेखाने शेवट.
एकूण तीन पत्रे आहेत. मात्र लेख केवळ चार पृष्ठांवर आहे. मुखपृष्ठ मलपृष्ठ कोरे आहे.
एकदा मधला पत्रा सोडवून पुन्हा उलटा गोवला आहे.
 
 
 
 

देवनागरी लिप्यंतरDevnagarI Transcription

 
 

Meaning in Marathi

आपल्या पराक्रमाने विदर्भ आणि अश्मक(मराठवाडा) मंडलांचा थरकाप उडवणारा, मानांक नृपती होऊन गेला. तो धनवान कुंतलांचा प्रशासक, प्रजेत सुकीर्तीने, साधूंमध्ये विनयाने, शत्रूत शौर्याने, राजांमध्ये त्यागाने अशा गुणांमुळे सर्वत्र जो प्रकाशित आहे, आणि देह सोडून गेल्यावर देखील जो गुणांमुळे येथे स्थिर आहे. त्याचा पुत्र देवराज, जो देवराज (इंद्रा) प्रमाणे संपत्तीचे कण बेभानपणे गुप्ततेने उधळतो. विनयाने शौर्य त्यागा विना भू तितिर प्रमेय सत्य होते. ग्रह नक्षत्रांची स्थिती जोवर आहे तोवर भोगण्यास योग्य. गुंड आणि भाडोत्री सैनिकांना प्रवेश नसणारे, जेथील प्राण्यांची खरेदी होऊ शकणार नाही अशा -
ब्राह्मण कौण्डिण्यस गोत्र कुमार स्वामी, हारित गोत्र चंद्र  स्वामी, वत्स गोत्र बोप्प  स्वामी, कौण्डिण्य गोत्र चवनाग  स्वामी, कृष्णात्रेय गोत्र यज्ञ  स्वामी,  मठर गोत्र इन्द्र  स्वामी, कौशिक गोत्र मातृ  स्वामी,भारद्वाज गोत्र गोप  स्वामी, गोतमगोत्र खोल्ल  स्वामी,  काश्यपगोत्र श्री  स्वामी,  आपल्या बोलण्याने एकत्र येवून चाळीस ब्राह्मण धरणे धरून बसले. त्यांचे जोरजोराने ओरडणे ऐकून राष्ट्रकूट खरोखर जो खाली उतरून समजून घेतो. धर्मपर राज्य  करतो  लोकांना एकत्र करून त्यांना तोडून न टाकता न फसवता. ज्याचे गुण शुद्ध प्रकाशतो,त्याचा पुत्र सुद्धा राजांवर विजय मिळवणारा आहे. रुढीने वाकणारा  कुत्रासुद्धा  पवित्र नसतो. सहा वर्गशत्रूंना न जुमानता राज्य करतो तो खरोखरच अविधेय. न मोजता येणारे देण्यास सदैव पुढे येणारा खरेच तयार. तयार प्रमुख  शत्रू आणि याचकांचा आवडता.ज्याला जे हवे ते देणारा. शत्रूंना मृत्यू आणि याचकांना प्रेम. तेंव्हा त्याने राजमाता मातापिता आणि स्वतःच्या यश पुण्ण्याच्या वृद्धी साठी उलाहिका नावाचे(/लाहिकांचे ) गाव ब्राह्मणांना भक्तिभावाने(/सत्क्रीयेने ) दान केले. महामार्गशिर्ष वर्षाच्या चन्द्रग्रहणानिमित्त दान. भगवान  वेदव्यासानी लिहून ठेवले आहे, भरपूर जमीन दान करणा-या राजानी, सगर आदिनी (सांगीतले) जेंव्हा ज्याची जमीन तेंव्हा त्याचे फळ. यास होकार देणा-यास साठ हजार वर्षे स्वर्गात आनंद मिळेल. अन्यथा नरकात जागा. न्यायदान जाहीर केले. अपलक (/प्रपालक= रक्षणकर्त्याचे) स्थान दक्षिणेने वेणुगिरी पश्चिमेने कुकुडवाड  उत्तरेने हिवरेवाडीवत न्यायदान कोरले(लिहिले)------------- अविधेय विशयपति जीवदेव सन्तकाने(मालकाने) गावच्या पाटलाने सर्व करणाध्यक्षांसमोर   देवदत्ताने कोरले.
 

स्थाननिश्चय location

शेवटच्या काही ओळीत कुत्कुतवट, हिमिरवाडी, वेणुगिरी ही नावे आहेत. दान केलेले गाव उलहिका आहे.
आज त्यापैकी हिवरवाडी कुकुड्वाड ही गावे नांदती आहेत. सातारच्या दक्षिण पूर्वेला मायणी म्हसवड रस्त्यावर कुकुडवाड आहे.
चहू बाजूनी डॊंगरानी वेढलेले. उजाड बोडक्या टेकड्या. माळराने. मात्र खिंड ओलंडताच हिरवेगार. त्याच्या पश्चिमेला हिवरवाडी आहे, खिंडीअलीकडे.
ताम्रपटात कुकुड्वाडच्या पूर्वेला, हिवरवाडीच्या दक्षिणेला, वेणुगिरीच्या उत्तरेला स्थान सांगीतले आहे.
 

विषेश Important

  1. जोडाक्षरे:- या लिपीत जोडाक्षरे प्रथम उच्चारले जाणारे वर त्या खाली नंतरचे असे लिहिले आहे
  2. ऋ या अक्षराऐवजी अर्धा र आणि इ वापरला आहे जसे नृ ऐवजी न्री
  3. ज्ञ ऐवजी ञ्ज वापरले आहे.
  4. अक्षरवळण गुप्त कालीन आहे

कालनिर्णय

  • ताम्रपट वाचणे सोपे आहे,त्याचा अर्थही लावणे सोपे आहे. मात्र कालनिर्णय सर्वात कठिण काम. 
  • या लेखात मानांक, देवराज, अविधेय याची नावे आली आहेत. सन्मान्य मिराशींच्या नोंदीनुसार अविधेय हा ४४० ते ४५६ दरम्यान होऊन गेला.
  • अक्षराचे वळण सर्वसाधारणपणे शतकाप्रमाणे बदलत जाते, भौगोलिक स्थितीनुसार बदलत जाते. प्रस्तुत वळण हे दुसरे शतक ई.स. नंतरचे आणि सहाव्या शतकापूर्वीचे आहे.
  • दान देण्याचे कारण चंद्रग्रहण" महामार्गशिर्ष वैशाखस्य चंद्रपरागे"
  • चंद्रग्रहण नेहमी पूर्णचंद्राला पौर्णिमेला होते. म्हणजे वैशाख पौर्णिमा ही तिथी आहे.

महामार्गशिर्ष म्हणजे काय?

हे संवत्सराचे नाव आहे. बार्ह्यस्पत्य कालगणनेत असा उल्लेख केला जातो. 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

No comments:

Post a Comment

मनसर

 प्रकार : गिरीदुर्ग जिल्हा : नागपुर उंची : १२०० फुट ...