Tuesday, August 2, 2022

ओतुर (जुन्नर) गावचा दडलेला इतिहास

 












ओतुर (जुन्नर) गावचा दडलेला इतिहास उजाळा देणारा असुन तो सातव्या शतकाचा असल्याचे पुरावे येथे मिळतात. तसेच नाणेघाट- जुन्नर-ओतूर- लागाचाघाट-पैठण हा पुरातन व्यापारी मार्ग असावा. सर्वात मोठी तेलाची पौराणिक बाजारपेठ ओतुरलाच असल्याचे ठोस पुरावे मिळतात.
ओतुर शब्द ओठी किंवा ध्यानी येताच सर्व प्रथम मनी एक वाक्य बोध होतो ' रामकृष्ण हरी" कारण हा मंत्र जगाला देणारे व जगद्गुरू संत तुकाराम महाराज यांचे गुरू चैतन्य स्वामी महाराज यांच्या पदस्पर्शाने पावन व येथेच समाधिस्थ झालेली ही भुमी, क्षत्रीय कुलावंत श्री. शिवछत्रपती शिवाजी महाराज यांची हीच ती जन्मभूमी.
जुन्नर शहराच्या उत्तरेस वसलेले व 20 कि.मी अंतरावर असलेले, माता मांडवी नदीने हाराच्या आकाराच्या निसर्ग सौंदर्याने फुललेल्या बहारदार विविध वनस्पतींनी विळखा घातलेले, पिंपळगाव जोगा व चिल्हेवाडी धरणांनी शेतीप्रधान बनवुन सुजलाम सुफलाम बनवलेले हे छोटस ओतुर गाव. विकासाच्या बाबतीत जुन्नर तालुक्यात अग्रगण्य असल्याचा मान मिळतो तो याच गावाला. व्यवसायाच्या बाबतीतही या गावचा गोड महीमा गायला जातो. आशा या गावचा ऐतिहासिक वारसाही तेवढाच पौराणिक व बलाढ्य आहे.
आज दुपारी ओतुर गावला तळपत्या उन्हात भेट देण्याची इच्छा झाली. ओतुर प्रवास जुन्नरहुन मोटारसायकलवर सुरू केला. कांदा काढण्याची धावपळ शेतकरी बांधवांची दिसून येत होती. काही मातांनी बाभळीच्या वृक्षाचा एका बाजूने आधार घेऊन दुसरा आधार ट्रॅक्टर ट्राॅलीचा घेत आपल्या तान्हुल्याला साडीच्या झोळीत झोपवल्याचे दृश्य दिसत होते. कुणी कांदे काढत होते, कुणी काटत होते, कुणी भरून आरणीमध्ये ओतत होते. एवढी उठाठेव फक्त या दोन इंच पोटासाठी चाललेली दिसत होती. दृष्य पाहत न्याहाळतच प्रवास चालला होता. बनकर फाट्यावर कल्याण - नगर महामार्गवर उजवा मोड घेत पुर्वेकडे प्रवास सुरू केला. मांडवी नदी पात्र ओलांडण्याआधीच हाॅटेल माळशेजच्या शेजारी ऑशिंग सेंटरच्या उत्तरेला असलेल्या कच्या वाटेने जो रस्ता जुन्या पोलीस स्टेशन पाशी घेऊन जातो त्या दिशेला प्रवास चालु ठेवला. अगदी 5 मिनिटांनी मोटारसायकल पुष्पावती नदिच्या बंधार्यावरून पलीकडे नेऊन महादेवाच्या मंदिराच्या उत्तरेस असलेल्या एका वृक्षाच्या छायेत उभी केली.यापुढे माझी ऐतिहासिक वस्तूच्या निरिक्षणाची सुरूवात झाली.
प्रथम महादेवाचे दर्शन घेतले. याच मंदिराजवळ येथील रहिवासी विसावला जातो. येथेच एक पौराणिक दगडी शिल्प व शिवलिंग दृष्टीस पडते ते शिल्प ती वीरघळ असल्याचे संकेत देतात. परंतु या मंदिराच्या उत्तरेला व नदिपात्रात असलेल्या एका चौथर्यावरील हनुमानाच्या छोट्या पडक्या मंदिरासमोर एक मनुष्या कृतीत साधारण एक फुट बाय एक फुट जीर्ण दगडी झालेले शिल्प येथील इतिहास 7 शतकाच्या आधिच कालखंड दर्शविण्याचा प्रयत्न करत आहे.समोरच पुर्वेस असलेल्या दगडातील कोरीव शिल्पांनी माझे विशेष लक्ष वेधून घेतले. प्रथमदर्शि हे सिमेंटचे पाईप असावेत असा भास झाला. परंतु तो समज चुकीचा होता. 120 सें.मी लाबीचे व 70 सें.मी व्यास असलेले दोन दगडी अगदी चाकाच्या आकाराचे परंतु लांबट कोरीव शिल्प कि ज्याला आतमध्ये साधारण दोनफुट कोरलेले असुन त्यात बारीक व मोठे असे एक एक वर्तुळाकार कोरलेले आहेत. व तळाशी चौकोन कोरला आहे. हेच ते तेलाच्या घाणीचे शिल्प कि ज्याचा उपयोग खाद्य तेल काढण्यासाठी हमखास केला जायचा. तेलाचे घाणे मध्ययुगीन कालखंड छत्रपती शासन ते पेशवे कालीन तसेच ब्रिटिश कालखंडात सुध्दा कैद्यांना शिक्षा म्हणून तेल काढण्यासाठी त्यांचा उपयोग केला जात असे.या तेलाच्या घाणीचे पुरावे सातार्याच्या प्रत्येक गडाच्या पायथ्याशी व भोर तालुक्यातील पंत समाधीच्या समोरील मंदिराच्या नदिपात्राच्या काठी पहावयास मिळतात. तसा विचार केला तर येथे आपणास तेली समाजपण चांगल्या प्रमाणात असल्याचे निदर्शनास येते.या ठिकाणी आज असे दोन एकत्र व तेथेच थोडेपुढे डावीकडे बांधावर अर्ध उघडा एक असे एकूण तीन शिल्प आपणास दिसतात. परंतु मी सांगू इच्छितो की येथे आजूबाजूला गाडलेली याच स्वरूपातील अनेक शिल्प असावित. आज येथे अस्तव्यस्त पडलेली हिच शिल्प गावचा इतिहास सांगतात त्याच शिल्पांना केराची टोपली दाखवली गेली असून या ठिकाणी घाणीचे साम्राज्य पसरल्याचे पाहून दुःख होतय. हा ठेवा ऐतिहासिक वास्तू म्हणून जतन केला गेला पाहिजे. मी ओतुरगावतील ग्रामस्थ बंधुना विनंती करू इच्छितो की हा अनमोल ठेवा जरी बिनकामाचा असला तरी तो आपल्या गावच्या इतिहासा पोटी जतन केला गेला पाहिजे तरच आपल्या गावचे ऐतिहासिक महत्त्व चिरंतन काळ टिकू शकेल. कारण गावचा इतिहास सांगताना आपल्याला पौराणिक संदर्भ द्यावे लागतात याचा विसर पडता कामा नये.
समोरच असलेली वैकुंठधाम वेस आपणास ओतुरगावातील निजामशाही कालखंडातील बांधकामाच्या शैलीचा असलेला परंतु लोप पावलेला भुईकोट किल्ला निदर्शनास पडतो. साधारण 25 फुट ऊंच व तेवढीच रूंद व जाड असलेली टोलेजंग वेस आपले खास आकर्षण बिंदू ठरते. अशाच स्वरूपाच्या चैतन्य वेस व नगर वेस अशा एकुण तीन वेसी आढळतात. परंतु फक्त वैकुंठधाम या वेशीचे 15 फुट ऊंची व 4 इंच जाड व 85 इंच रूदी असलेले लाकडी दरवाजे जरी जिर्ण झाले असले तरी स्वतःच्या मजबुतीचे प्रदर्शन करत अगदी दिमाखात उभे राहिले आहेत. दोन्ही दरवाजांच्या मागे सात फुट ऊंचीच्या देवळ्या बांधन्यात आलेल्या आहेत. या वेसीच्या दक्षिणेला व उत्तरेला असलेल्या तटबंदीच्या पडक्या भिंती आपल्या अस्तित्वाची जाण करूण देतात. परंतु येथील एक बाय अर्धा फुट रूंदिच्या विटा आपणास यादव कालखंडाचे दर्शन देतात. त्यावेळी या विटांची निर्मिती तोफेचा मारा सहन करण्यासाठी बाधकामात केला जात असे व तो मजबूत पण असे.
उत्तरेला तटबंदी भिंतीच्या तळकाठी एक दगडी शिल्प आपणास शिलाहारांच्या कालखंडातील हेमाडपंती यांच्या बांधकाम व कोरीव शिल्पकलेतील शैलीत घेऊन जाते. अर्थातच हा कालखंड 7 ते 10 शतकातील असल्याचे संदर्भ आपणास पहावयास मिळतात. हे शिल्प यक्षाचे असून या शिल्पाचे संदर्भ सांगतात की यक्षांनी आकाश तोलुन धरले आहे त्याचे प्रतिक म्हणुन यक्षांनी मंदिराचे छत तोलुन धरले आहे. हे शिल्प आपल्याच तालुक्यातील कुकडेश्वराच्या मंदिराच्या गाभार्यातील छताच्या खांबावर विराजमान असलेले दिसुन येते. याचा अर्थ असा की ओतूर मध्ये दोन हेमाडपंती मंदिरे पुर्वी असावित. त्यापैकी एक मंदिर कि ज्याचा अलिकडच्या काळात जिर्णोद्धार केला गेला ते मंदिर म्हणजेच कपर्दिकेश्वर मंदिर होय. या मंदिर परीसरात अस्तव्यस्त पडलेले अनेक शिल्प हेमाडपंती असल्याचे दाखले देतात. येथील असलेले शिवलिंग व नंदी शिल्प हे पुरावे कमी नाहीत.
ओतूर गावचा इतिहास अभ्यासावा तेवढा थोडाच आहे. येथील असलेले वाडे, प्रत्येक वाड्यात असलेले आड व जिथे आड आहे त्या घरात एक शिक्षक आहे हा पण एक चमत्कारच म्हणावा लागेल. येथील संस्कृती जपण्या व जोपासण्या योग्य आहे. म्हणून अनेक इतिहास संशोधकांना सांगु इच्छितो की या गावचा इतिहास अभ्यासक म्हणून एकदा येथे येऊन पाहुन भेट देऊन अवश्य जावे.
लेखक/ छायाचित्र : श्री.खरमाळे रमेश
(माजी सैनिक खोडद)
मो.नं. 8390008370
शिवाजी ट्रेल
फेसबुक पेज- निसर्ग रम्य जुन्नर तालुका .
 
 कपर्दिकेश्वर शिवालय ओतुर
मांडवी नदीच्या काठावर वसलेले ओतूर हे आमचं मूळ गाव. मांडवी नदी ही कृष्णा खोऱ्यातील उत्तरेकडील पहिली नदी. हरिश्चंद्रगडासमोरील भैरवगडाच्या पूर्व उतारावर नदीचा उगम आहे. हे ठिकाण मांडवे कोपरे या आदिवासी गावांच्या पश्चिमेला आहे. या नदीवर  चिल्हेवाडी पाचघर येथे २ TMC चे  मातीचे धरण साधारण विसेक वर्षांपूर्वी बांधले. Masonry or Concrete धरणासाठी ideal site होती.आणि थोडी उंची वाढवली असती तरी पुनर्वसनासाठी जास्त वस्ती नव्हती.  अर्थात हे माझं वैयक्तिक मत आहे.
धरणाची  भिंत जिथे आहे तिथे उंच घळी आहेत . ज्यांनी मिलिंद गुणाजी यांचं भटकंती हे पुस्तक वाचलं आहे त्यामध्ये 'दर्याबाईचा डोह' या पर्यटनस्थळाचा उल्लेख आहे ,ते ठिकाण आता १०० फूटांहून खोल पाण्याच्या फुगवट्यात गेले आहे.  धरणाची साइट एकदम निसर्गरम्य ठिकाणी आहे. धरणाचा सांडवा डोंगर उतारावर नैसर्गिक असा आहे.
        मांडवी नदी नेतवड इथे माळशेज घाटातून येणाऱ्या पुष्पावती नदीला मिळते . तिथे ब्रिटीशकालीन बंधारा आहे .  या नदीला ओझर येथे कुकडी नदी मिळते व पुढे कुकडी नावाने उंब्रज इथे धरणं आहे ज्याच पाणी नगर आणि सोलापूर जिल्ह्यात जाते.   जुन्नर तालुक्यात पुष्पावतीवर पिंपळगाव जोगा, कुकडीवर माणिकडोह, मीना नदीवर वडज अशी मोठी धरणे आहेत त्यामुळे तालुका सुजलाम सुफलाम आहे.
मांडवी नदीवर इंग्रजी S आकाराची खूप वळणं आहेत    ज्याच वर्णन  च्या भागवत सरांनी लिहिलेल्या भूगोलाच्या  पुस्तकात आहे.
ओतूरचे मूळ नाव उत्तमापूर . इथे शंकराचे कपर्दिकेश्वर हे प्राचिन मंदिर आहे . श्रावण महिन्यात दर  सोमवारी मोठी यात्रा भरते. तांदळाच्या पिंडी हे वैशिष्ट्य आहे . या पिंडींसाठी गुरव गावातून तांदूळ गोळा करतात व आदल्या दिवशी म्हणजे रविवारी पुजा अर्चा करून डिंक/गोंद न वापरता खाली फोटोत दाखवल्याप्रमाणे पिंडी तयार करतात. दुसऱ्या सोमवारी दोन अशा प्रत्येक श्रावणी सोमवारी वाढवत नेतात. यात्रेस भीमाशंकर यात्रेएवढीच गर्दी होते. संत तुकाराम महाराजांना " रामकृष्णहरी " हा मंत्र दिला ते केशव चैतन्य महाराजांची समाधी मांडवी तीरावरच आहे. त्यांची संजीवन समाधी म्हणजे वारुळच आहे.
        पाच धरणं एकाच तालुक्यात असणारा जुन्नर तालुका एकमेव असावा. मावळही असेल बहुतेक. शिवनेरी, हडसर,जीवधन, सिंदोळा, हरिश्चंद्र गड, नारायणगड सारखे शिवकालीन किल्ले,नाणेघाट, दाऱ्याघाट, माळशेज घाट, लागाचा घाटअशी अनेक निसर्गरम्य ठिकाणं या परिसरात आहेत. घाटमाथ्याला लागून असलेली खिरेश्वर, मांडवे कोपर , फोपसंडीे, वाऱ्या घाट ही ठिकाणे म्हणजे पावसाळ्यात स्वर्गच.



 कपर्दिकेश्वर मंदीर सोळा वर्षापुर्वी

कपर्दिकेश्वर मंदीर दोन वर्षापुर्वी

नवीन फरसबंदी आणि दीपमाळेचे काम
 
तांदळाच्या पिंडी








 मंदीर परिसरातील शिल्प


पेडगावचा ब्रिटीश कालीन बंधारा


चिल्हेवाडी पाचघर धरण


 
 
 
 
 
 
 

No comments:

Post a Comment

मनसर

 प्रकार : गिरीदुर्ग जिल्हा : नागपुर उंची : १२०० फुट ...