Monday, August 15, 2022

वेरुळ लेणी अंतिम माहिती भाग १

    वेरुळ म्हणजे लेण्यांसाठी जगप्रसिद्ध असलेले भारतातील स्थळ. ते महाराष्ट्रात औरंगाबादच्या वायव्येस सु. २९ किमी. वर वसले आहे. या गावाजवळून इला नदी वाहते. हि लेणी म्हणजे संपूर्ण भारताच्या (आणि त्यातही महाराष्ट्राच्या जास्त) जिव्हाळ्याचा विषय. देशातीलच काय पण विदेशातील पर्यटकसुद्धा इथे येऊन तोंडात बोट घातल्याखेरीज राहत नाहीत इतका ऐतिहासिक वारसा येथे पाहायला मिळतो.अजिंठा-वेरूळ यांचा उल्लेख एकत्र केला जात असला तरी पण दोघात जमीन अस्मानाचा फरक. एक त्यातील चित्रांसाठी आणि दुसरा अप्रतीम अशा कोरीव कामासाठी सुप्रसिध्द आहेत.
 युनेस्कोने जाहीर केलेल्या जागतिक वारसा यादीत भारतातील ज्या मानवनिर्मित वारसावास्तू, शिल्पांचा समावेश झालाय त्यातील औरंगाबादजवळील वेरूळ येथील लेणी-समूह म्हणजे पृथ्वीवर अवतरलेला जणू स्वर्गच!देशातील बहुतेक लेण्यांचे खोदकाम पहाडांच्या मध्यभागी झालेले आढळते. मात्र वेरूळचा लेणी समूह सलग प्रस्तरातून निर्माण झाला आहे. इतकेच नव्हे तर या लेण्यांचे खोदकाम ‘आधी कळस, मग पाया’ या वचनानुसार पहाडाच्या शिखरापासून प्रारंभ करून पायथ्यापर्यंत येत हे अलौकिक शिल्प साकारण्यातील शिल्पकारांचे कौशल्य वाखाणण्यासारखे आहे. लेण्यांचे खोदकाम हाती घेण्याआधी त्या अज्ञात शिल्पकारांनी नियोजित जागेचा निश्चितच अभ्यास करून आराखडा तयार केल्याचे जाणवते. लेणी खोदकामातील भूमितीशास्त्राबरोबर भूगर्भशास्त्र, पहाडी प्रदेशातील पत्थराच्या दर्जाचा अभ्यास करून येथे कामाला प्रारंभ झाला. संपूर्ण लेणी-समूहातून हवा-प्रकाशाबरोबर पर्यावरणाचाही अभ्यास या शिल्पकारांनी करून आम्ही किती प्रगत, अभ्यासू आहोत हेच जगाला दाखवून दिले आहे.
यापूर्वी- आधी निर्माण केलेल्या लेणी उभारणीचा अनुभव ध्यानी घेऊन खोदाईचे तंत्र कालांतराने विकसित झाल्याचे दिसते. या लेण्यांमध्ये दुर्मीळ असलेल्या इमारतीप्रमाणे मजल्याचे काम हाती घेण्यात आले हे विशेष. त्यासाठी जिने, गच्ची, सज्जे अशा प्रकारचेही पूरक बांधकाम करण्यात आले आहे. अजिंठा लेण्यांचे काम पूर्ण झाल्यावर इ.स. ५व्या शतकात ही अजरामर शिल्पकला निर्माण झाली. 
    जगप्रसिद्ध वेरूळ लेणी एलोरा केवज म्हणून जगभरात ओळख निर्माण झाली. खरे पाहिले तर कन्नड शब्द इलुरा म्हणून या परिसराला ओळखले जायचे. मात्र मराठीत याला वेरूळ असे उच्चारला जात होते. इंग्रजांच्या काळामध्ये या परिसराचा नाव घेताना त्यांना अडचण येत होती म्हणून इंग्रज कन्नड शब्द इलुरा असा असल्याने त्याला एलोरा असं संबोधू लागले. आणि त्यातूनच एलोरा हे नाव देश-विदेशात पोहोचले अशी एक उपपत्ती मानली जाते. इंग्रजांमुळे विदेशात या परिसराला एलोरा अस नाव देण्यात आले. त्यामुळे आजही देश-विदेशात एलोरा केवज अशी ओळख या जगप्रसिद्ध वेरूळ लेणीला मिळाली.याशिवाय ज्या पहाडात ही लेणी निर्माण झाली, त्याला ‘येलू’ पर्वत असे म्हणतात. त्याच्याजवळून ‘येलगंगा नावाची नदी वाहते’ येलू पर्वत आणि येलगंगा यावरून या ठिकाणाला ‘येलूर’ हे नाव पडून  कालांतराने त्याचे ‘वेरूळ’ हे नाव रूढ झाले.







या गावाची महाराष्ट्राला असलेली आणखी एक ओळख म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांचे भोसले घराण्याचे मूळ गाव वेरूळ आहे. सह्याद्रीच्या रांगेतील सातमाळ म्हणून ओळखल्या जाणार्‍या पर्वतरांगेत, दोन किलोमीटर परिसरात वेरूळ लेण्यांचा समूह विखुरलेला आहे.सध्याच्या गावाच्या पश्चिमेला असलेल्या बालाघाटच्या टेकड्यांत, औरंगाबाद-वेरूळ या मार्गावरच दक्षिणेकडून उत्तरेकडे लेणी खोदण्यात आलेली असून त्यांची एकंदर संख्या चौतीस आहे. पुरातत्त्वखात्याने क्रमांक न दिलेली अनेक लहानमोठी लेणी या डोंगरात पसरलेली आहेत. मुख्य समूहातील दक्षिणेकडील भागात बारा लेणी असून ती बौद्ध धर्मीयांची आहेत. त्यानंतर सतरा लेणी हिंदू धर्मीयांची असून, त्यानंतर उत्तरेकडील पाच लेणी जैन धर्मीयांची आहेत. वेरूळच्या बौद्ध लेण्यांचा प्रारंभ सहाव्या शतकाच्या सुरुवातीस व्यापक प्रमाणात सुरू झाल्याचे दिसते. परंतु त्यातील अनेक प्रकल्प पुरेशा द्रव्यबळाअभावी इ. स. ६०० च्या आसपास बंद पडले असावेत. बौद्धांनी अर्धवट सोडलेल्या कित्येक गुंफा नंतर हिंदू लेण्यांमध्ये परिवर्तित केल्या गेल्या असाव्यात.
     वेरूळची लेणी साधारणत: इ.स.च्या पाचव्या ते दहाव्या शतकाच्या कालखंडात कोरण्यात आली असून प्राचीन भारतातली बौद्ध, हिंदू आणि जैन धर्मांमधली परस्परसहिष्णुता प्रकर्षाने दाखवतात.सर्वसाधारणपणे येथील लेण्यांची निर्मिती इ.स. सहाव्या शतकापासून पुढे टप्प्याटप्प्याने होत गेली. वाकाटकांच्या ऱ्हासानंतर चालुक्य आणि कलचुरी या दोन राजवंशांच्या संघर्षकालातच ही लेणी कोरली गेली. तत्कालीन अस्थिर राजकीय परिस्थिती आणि या लेण्यांचे भौगोलिक स्थान यांतून वेरूळच्या लेण्यांतील व्यामिश्र कला आणि प्रादेशिक परंपरांचा उलगडा होतो. राष्ट्रकूट घराण्याच्या ताम्रपटात (आठवे शतक) या स्थळाचा उल्लेख `एलापुर' असा केलेला असून त्यात येथील उत्कीर्ण लेण्यांचाही संदर्भ दिला आहे. अजिंठा येथील कलापरंपरा हरिषेण या वाकाटक सम्राटाच्या मृत्यूनंतर म्हणजे पाचव्या शतकाच्या अखेरीस खंडित झाली आणि तेथून बाहेर पडलेले शेकडो कलावंत नव्या राजवटीच्या आश्रयाखाली वेरूळच्या लेण्यांवर काम करू लागले, असे एक मत आहे. वेरूळ शिल्पाचा शैलीदृष्ट्या विचार करता हे मत थोड्याफार फरकाने ग्राह्य वाटते. सहाव्या शतकाच्या सुरुवातीच्या काळात, बहुधा कलचुरींच्या आश्रयाखाली हे काम सुरू झाले असावे. रामेश्वर लेण्याच्या समोर सापडलेली कलचुरी नाणी या कयासाला दुजोरा देतात. हिंदू शिल्पप्रवृत्तीचा पहिला टप्पा प्रामुख्याने पाशुपत शैव संप्रदायाशी निगडित आहे. सहाव्या शतकाच्या सुरुवातीपासून ते चालुक्यांच्या कलचुरींवरील निर्णायक विजयापर्यंत-म्हणजे सातव्या शतकाच्या सुरुवातीपर्यंत-तो पूर्ण होतो. दुसरा टप्पा राष्ट्रकूटांच्या प्रवर्धमान शासनकाळात भक्तिसंप्रदायाच्या छटा दाखवणारा तर तिसरा टप्पा, ज्यात प्रामुख्याने जैन लेणी येतात, तो उत्तर राष्ट्रकूट काळात म्हणजे दहाव्या शतकाच्या शेवटीशेवटी पूर्ण झालेला दिसून येतो. यादवकाळातही काही तुरळक काम येथे झाले असावे. आठव्या शतकात येथील स्थापत्यकलेला बहर आला आणि सर्वोत्कृष्ट निर्मिती या काळात झाली.
        या लेण्यांचा आधी मध्ययुगीन इतिहास समाजावून घेउया आणी मग वेरुळ लेण्यांची सविस्तर माहिती घेउया . महानुभाव पंथाचे संस्थापक श्रीचक्रधर तेराव्या शतकात वेरूळ गुंफामध्ये वास्तव्य करून होते, असा स्थानपोथीमध्ये उल्लेख आहे. वेरूळ हे प्रदीर्घ काळापर्यंत तांत्रिक योगाचाराचे केंद्र होते, असेही दिसून येते. यानंतरची वेरूळची जी माहिती मिळते, तीनुसार छत्रपती शिवाजी महाराजांचे आजोबा मालोजी भोसले हे वेरूळची पाटीलकी चालवीत होते, असे कळते. अठराव्या शतकात अहिल्यादेवी होळकर (कार. १७५६–९५) यांनी इला (येलगंगा) नदीच्या काठी घृष्णेश्वर हे ज्योतिर्लिंगाचे मंदिर बांधले. अहिल्यादेवींनी माणकेश्वर मंदिराचा (कैलास लेण्याचा) जीर्णोद्धार करून तिथल्या धूपदीपासाठी वर्षासन बांधून दिले, अशीही माहिती मिळते. मंदिरावर मध्ययुगीन रंगरंगोटीच्या खुणाही स्पष्ट दिसतात. अगदी अलीकडे या लेण्यांच्या परिसरात सातवाहनकालीन (इ. स. पू. दुसरे शतक ते इ. स. तिसरे शतक) वास्तूंचे अवशेष सापडल्याची नोंद झाली आहे. हैदराबादच्या निजाम राजवटीकडे या लेण्यांची मालकी जाईपर्यंत इंदूरच्या होळकरांनी या लेण्यांची काळजी घेतली होती. मात्र इ.स. १९५१ साली भारत सरकारने वेरूळ लेणी हे राष्ट्रीय स्मारक असल्याचे घोषित केले आणि त्यानंतर ती भारत सरकारच्या पुरातत्त्व विभागाकडे सोपविण्यात आले.
  छत्रपती शिवाजीराजे यांचे पणजोबा बाबाजी भोसले यांच्याकडे वेरूळ गावची पाटीलकी होती. तसंच परिसरातील गावांची जहागिरीही होती. त्याकाळी दौलताबाद आणि वेरूळ एकच समजलं जायचं. अहमदनगरच्या निजामशाहीचं राज्य सांभाळताना मोगलांशी लढाईचं नियोजन निजामशहानं इथूनच केलंबाबाजी भोसले यांच्या कार्यकाळात हा मुलुख निजामशाहीच्या अंमलाखाली होता. त्यांना मालोजीराजे आणि विठोजीराजे अशी दोन मुलं होती.मालोजीराजांनी बरीच जनहितार्थ आणि धार्मिक कार्यं केली. शिखर शिंगणापूरातील तलाव, वेरूळच्या घृष्णेश्वराच्या देवालयाचा जीर्णोद्धार ही काही उल्लेखनीय कार्य म्हणता येतील. आक्रमकांनी घृष्णेश्वराचं मंदिर पाडल्यानंतर मालोजी राजे यांनी त्याचा जीर्णोद्धार केला. पण मराठी बखरी, कागदपत्रे आदी साहित्यात तसा उल्लेख आढळत नाही. मालोजीराजांना यांना दोन मुलं होती. त्यापैकी थोरले शहाजीराजे तर धाकट्या मुलाचं नाव शरीफजी होतं. शहाजीराजे यांचा जन्म इथेच वेरूळला झाला. मालोजीराजे यांच्या मृत्यूनंतर निजामशहानं त्यांची जहागिरी त्यांच्या मुलांना दिली. विठोजी राजे यांच्या मार्गदर्शनाने सुरुवातीला त्यांनी आपल्या जहागिरीचा कारभार बघितला.

मालोजीराजे भोसले समाधी वेरूळ

      संभाजीनगर (औरंगाबाद) जिल्ह्यात ह्या हिंदूस्थानाच्या इतिहासाला कलाटणी देणार्या दोन पुरूषांची समाधी आहे. संभाजीनगर परिसरात आल्यावर बारा ज्योर्तिलिंगापैकी एक असलेल्या घृष्णेश्वराकडे मंदीराकडे जाताना दगडात कारलेले इतके सुंदर नक्षीकाम कोणत्या देवालयाचे असेल? हा प्रश्न तुम्हाला सतावल्यावाचून राहणार नाही. वेरूळच्या घृष्णेश्वर मंदिर परिसरात मालोजीराजे भोसले चिरविश्रांती घेताहेत साक्षात स्वराज्य संकल्पक शहाजीराजे महाराज यांचे पिताश्री आणि पुण्यश्लोक छत्रपती शिवाजी महाराज यांचे आजोबा मराठेशाहीच्या इतिहासातील एक महत्त्वाच्या व्यक्ती ज्या राजे भोसले घराण्याने शतकानुशतके गुलामगिरीच्या अंधकारमय राजवटीत होरपळून निघालेल्या रयतेला स्वातंत्र्याचा ,स्वराज्याचा राष्ट्रप्रेमाचा धर्मनिष्ठेचा महामंत्र दिला त्या भोसले घराण्याचे संस्थापक एक कर्तबगार व्यक्ती घृष्णेश्वर मंदीराचा जिर्णोद्धार मालोजीराजे भोसले यांनीच केला होता.तसेच शिखर शिंगणापूरच्या शंभू महादेवाच्या परिसरातील पुष्करणी तलाव आताचे शिवतीर्थ हे मालोजीराजे यांनीच बांधले आहे.
       हे आपल्याकडेच असं का होतं?एका इतिहासातील खलनायकाला देवालयात स्थान मिळतं, तिनशे वर्षांनंतरही त्याच्या स्मृतीस्थळाची नित्य देखभाल केली जाते, त्यावर दिवाबत्ती लावली जाते,अनं दुसर्‍याच्या वाट्याला येते प्रचंड हेटाळणी.मालोजीराजे भोसले आणि औरंगजेब...भारताच्या इतिहासातली अत्यंत महत्वाची पाने यांच्या पराक्रमाने भरली आहेत...दोघांच्या भूमिका हिन्दूस्थानच्या दृष्टीने तशा परस्परविरोधी.मालोजी राजांनी अचाट बाहुबलाच्या जोरावर मैदानात मराठी पराक्रमाचा झेंडा रोवला...हिंदवी स्वराजाचे स्वप्न रंगविणार्‍या शहाजी या पराक्रमी पुत्राला जन्म दिला, तर औरंगजेबने आपल्या अत्यंत धुर्तपणाने राजकारण करून अवघ्या भारतवर्षावर निरंकुश सत्ता प्रस्थापित केली.त्यावेळची जगातली ही एक बलशाली राजवट होती.. एक अशी व्यक्ती ती म्हणजे औरंगजेब त्याची हि कबर वेरूळ जवळ खुलताबादेत आहे हा तोच औरंगजेब ज्याला मराठ्यांना हरविण्यासाठी लाखोंची फौज घेऊन महाराष्ट्रात यावे लागले तब्बल 25 वर्षे त्याला मराठ्यांना हरविण्यासाठी दिल्ली सोडून महाराष्ट्रात भटकावे लागले पण त्याला मराठ्यांना हरविता आले नाही शेवटी त्याला मरावं लागले ह्या महाराष्ट्रात भिंगार मध्ये आणि त्याची कबर खोदली संभाजीनगरच्या खुलताबादेत .ती पण मराठ्यांनीच त्यांची साक्ष आजही त्याची कबर देतेय. हा योगायोग म्हणावा लागेल कि ज्या हिंदूस्थानाला परकीय सत्तांच्या जुलमी राजवटीतून मुक्त करण्याचा महामंत्र देणार्या म्हणजे स्वराज्य संकल्पक शहाजीराजे महाराज यांच्या पित्याची हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांच्या आजोबांची मालोजीराजे भोसले यांची समाधी. वेरूळात घृष्णेश्वर मंदीराच्या परीसरात चिरविश्रांती घेताहेतपरंतू या दोघांच्या स्मृतीस्थळांना परस्परविरोधी भाग्य लाभल्याचे दिसून येते!ह्या दोन व्यक्ती दोन्हींचे विचार भिन्न कार्य कर्तृत्व भिन्न काळभिन्न औरंगजेबाच्या जन्माच्या पुर्वी अगदी थोड्या काळापुर्वी मालोजीराजे यांचे निधन झाले होते औरंगजेबाचा जन्म 1618 ला झाला पुढे त्यांच्या एकूण कर्तृत्वाने काय पाहिजे आणि त्यानंतर त्यांच्या बलाढ्य मुघल सत्तेचे काय झाले हि एक विचार करायला लावणारी गोष्ट. मालोजीराजे यांच्या कर्तृत्वाने नेतृत्वाने काय दिले.ह्या दोन व्यक्ती एकाच भूमीत चिरविश्रांती घेताहेत अंतर फक्त पाच किलोमीटरच आहे
   मालोजीराजांचा इतिहास विचारात घेतल्यास, मालोजीराजांचा जन्म १५५२ सालचा.विजापूर सुल्तानाविरुद्धच्या युद्धात इंदापूर येथे ते कामी आले.साल अंदाजे १६२० असावे. फलटणचे जहागिरदार ज्यांना बारा वजीराचा काळ असेही म्हणत त्यांचा पातशाही दरबारात विशेष दबदबा होता ते वणंगपाळ उर्फ जगपाळराव यांच्या मालोजीराजे आणि विठोजीराजे त्यांच्या सहवासात असताना मालोजीराजे आणि विठोजीराजे यांनी जगपालराव यांच्या कोल्हापूर मोहिमेत विशेष पराक्रम गाजवला .त्यांची किर्ती सर्वत्र झाली. मालोजीराजे यांचे शौर्य कर्तृत्व पाहून जगपाळराव नाईक यांनी आपल्या बहिण दिपाबाई ह्या मालोजीराजे यांना पत्नी म्हणून दिल्या होत्या. ह्या जगपाळराव आणि मालोजीराजे यांच्या मध्ये खूप स्नेह होता वेळोवेळी त्यांनी एकमेकांना मदत केली.मालोजीराजे यांच्या पराक्रमाने त्यांच्या अहमदनगरच्या निजामशाही दरबारात प्रवेश झाला आणि तिथे त्यांच्या विशेष सन्मान हि झाला त्यांना १६०४ साली अहमदनगरच्या निजामशाहीकडून जहागिरी मिळाली.आणि राजा हा किताब हि मिळाला होता. मालोजीराजे यांना स्वराज्य संकल्पक शहाजी राजे आणि शरिफजीराजे हि दोन मुले होती. मालोजीराजे हे इंदापूर येथे आदिलशाही विरुद्धच्या लढाईत धारातीर्थी पडले.ह्याच मालोजीराजे भोसले यांच्या पुत्रानं परकीय शत्रूत राहून हि आपल्या पराक्रमाच्या जोरावर परकीय शत्रूतही आपला दरारा ठेवला आणि एका सार्वभौम राजाप्रमाणे कर्नाटकात बंगलोर राजधानी बनवून राज्य केले आणि त्यांच्या नातवाने म्हणजे पुण्यश्लोक छत्रपती शिवाजी महाराजांनी तर हि अख्खी पातशाही पायदळी तुडवून रयतेचे आपले स्वराज्य निर्माण केले. आपल्या पराक्रमाने आणि शौर्याने स्वराज्याच्या भगवा ह्या हिंदूस्थानाच्या मातीत फडकवला आणि रयतेच्या गवताच्या काठीला हि कोणाची हात लावण्याची हिम्मत होत नव्हती असे सुशासन निर्माण केले आजही रयतेच्या मनात आपल्या महाराजांच्या बद्दल प्रचंड अभिमान आहे आणि आदर आहे. अश्या विश्ववंदनीय थोर महामानवांचे आजोबा मालोजीराजे भोसले.
    औरंगजेबाच्या तैमुर खानदानानं काय केलं निष्पाप रयतेवर अन्याय अत्याचार सत्ता संपत्ती साठी त्यांनी मानवतेच्या सर्व मर्यादा पार केल्या .आणि औरंगजेब याने त्यांच्या सत्तेसाठी काय केले कोणतीच मानवतेची मर्यादा पाळली नाही शेवटी त्यांच्या निधनानंतर त्यांच्या मुघल सत्तेचे काय झाले? सत्ता संपत्तीचा आणि ताकदीचा मोह नसावा हेच माणसाला र्हासास कारणीभूत ठरतात हेच औरंगजेबाचा तैमुर वंशाचा इतिहास सरकारकडे एकच विनंती आहे की ह्या शिवभक्त शुभम गायकवाड ची कि आपल्या विश्ववंदनीय हिंदवी स्वराज्याच्या पराक्रमी गौरवशाली वैभवशाली लोकहितवादी सांगणार्या आणि जपणार्या छत्रपती घराण्याच्या आद्य पितामहाचे मराठेशाहीचा पाया रचणाऱ्या महामानवाच्या श्रीमंत मालोजीराजे भोसले यांच्या समाधीचा जिर्णोद्धार व्हायला पाहिजे त्याठिकाणी भव्य ऐतिहासिक समाधी स्मारक व्हायला पाहिजे हि एक शिवभक्त म्हणून सदिच्छा ! 
 
 
 
 
 
 






मुख्य रस्त्यावरुन दिसणारी मालोजीराजे यांची समाधी
घृष्णेश्वर मंदीराकडे तोंड असलेल्या बाजुने समाधी.हे मुख्य प्रवेशद्वार असावे.
इतस्ततः पसरलेला कचरा,पार्क केलेल्या दुचाकी
मंदीराजवळील टपर्‍यांच्या वेढ्यात सापडलेली शिवाजी महाराजांचे आजोबा मालोजीराजांची समाधी
मालोजीराजे भोसले यांच्या समाधीचे शासनाने केलेले सुशोभीकरण.आजुबाजुला वाढलेली झाडेझुडपे
   
 
  आज मात्र मालोजीराजांच्या समाधी परिसरात गेल्यावर मन विषण्ण होते. चारही बाजूने वाढलेले गवत , झाडेझुडपे, लोकांनी टाकलेला कचरा. दोन बाजूने असलेल्या रस्त्यावरील टपऱ्यांनी घातलेला वेढा , वास्तूची दुरावस्था पाहून चीड आली. हिंदूंच्या नावाने मतं मागणारे, छत्रपतींच्या नावाने मतं मागणारे, छत्रपतीं फक्त आमचेच म्हणणाऱ्या संघटना, स्थानिक पुढारी, लोकप्रतिनिधी, लाखो रूपयांचे उत्पन्न असलेले हाकेच्या अंतरावर असलेले देवस्थान, त्यांचे विश्वस्त, नावाप्रमाणेच पुरातन झालेले पुरातत्व खाते आणि आमच्यासारखे मुर्दाड पब्लिक कोणालाही या दुरावस्थेबद्दल काहीच वाटत नाही. या अनास्थेमूळेच आपले किल्ले, गढी, वाडे, मंदिरे व वास्तू काळाच्या उदरात गडप होत आहेत.
वास्तविक हे ठिकाण काही आडबाजूला नाही.भरपूर  राबता असलेल्या एका ज्योतिर्लिंगाचे रस्त्यावर अवघ्या दोनशे फुटांवर आहे. समाधीच्या दुरावस्थेबाबत पेपरमध्ये बातमी सुद्धा आली होती तरी सरकारचे डोळे उघडत नाहीत.
  समाधीच्या चारही बाजूला दहा फूट दगडी फरसबंदी करून आणि त्यानंतर दहा फूट फुलझाडे व कंपौंड केल्यास व एक रखवालदार ठेवावा. सकाळी सात ते रात्री सात पर्यंत दर्शनासाठी उघडी ठेवावी म्हणजे मंदिरात येणारे भाविकही राजांच्या समाधीचे दर्शन घेऊ शकतील. घृष्णेश्वर देवस्थानने याबाबत पुढाकार घेण्याची आवश्यकता आहे. शासनाने लाखो रुपये खर्च करून जवळच असलेल्या मालोजीराजे भोसले यांच्या गढीचे प्रवेशद्वार , पुतळे व अन्य सुविधा केल्याचे दिसते आहे. परंतु तेथेही झाडेझुडपे वाढली आहेत. तेही पर्यटक पहातील अशी आशा नक्कीच करुया. कधी वेरूळला गेलात तर घृष्णेश्वरांच्या चरणी नतमस्तक व्हा तसेच जवळच मालोजीराजे हे चिरविश्रांती घेताहेत त्यांच्या हि चरणी नतमस्तक व्हायला विसरू नका. जय मालोजीराजे !

 वेरूळच्या घृष्णेश्वर मंदिराच्या मुख्य प्रवेशद्वाराच्या अगदी समोर टपर्‍यांनी वेढा घातलेली एक अतिशय जूनी दगडी समाशी आहे. ही समाधी शिवाजी महाराजांचे आजोबा मालोजी राजे भोसले यांची असल्याचे सांगितले जाते. या शिवाय मंदिराच्या डाव्या बाजूला अगदी संरक्षक भिंतीला लागून एक कबर आहे. कबरीच्या चार दरवाज्यांना लागून आठ कोरीव कातीव दगडी खांब आहेत. आतूनही ही कबर अतिशय चांगल्या अवस्थेत आहे. पण इथे कुणाला पुरलेलं दिसत नाही. ती जागा रिकामी आहे. या कबरीला जायला जागाच नाही. गच्च रानगवताने झाडा झुडूपांनी वेढलेला आहे हा परिसर. याला लागूनच पुढे शांतिगिरी महाराजांच्या आश्रम परिसरांत अजून एक छत्री आहे. 

या तिनही वास्तु अतिशय उपेक्षीत अशा आहेत. मालोजी राज्यांची समाधीचा दरवाजा पुरातत्व विभागाच्या रक्षकाने कुलूप लावून बंद केल्याने आत स्वच्छता राखलेली आढळून येते. बाकी सर्व परिसरांत घाण केलेली दारूच्या बाटल्या पडलेल्या आढळून येत आहेत. 


मुख्य रस्त्याच्या डाव्या बाजूलाच मालोजी राजांची गढी आणि भव्य असा पुतळा नव्याने उभा केला गेला आहे. मग ही जूनी समाधी का अशी उपेक्षीत ठेवल्या गेली? ही समाधी मालोजी राजांची नसून त्यांचे वडिल बाबाजी भोसले यांची असल्याचे पण सांगितले जाते. या बाबत नेमकी माहिती उपलब्ध होत नाही. 

मंदिरावर असलेले अप्रतिम असे कोरीवकाम, जून्या लाकडी वाड्यासारखी दगडावर कोरलेली नक्षी, सागवानी दरवाजे जसे असतात तसे तीन दगडी दरवाजे समाधीच्या तिन बाजूला आहेत. ते इतके हुबेहुब लाकडाचे वाटतात की आपण लाकूड समजून त्यांना ढकलू पाहतो. खिडक्यांच्या कमानी नक्षीच्या जून्या मंदिराच्या कमानींसारख्या वळणा वळणाच्या नक्षीने कोरलेल्या आहेत. 


लाकडी माळवदाला आधार देणारे खांब किंवा जून्या मंदिरावर यक्ष कोरले असतात तसे सुंदर अशी दगडी रचना समाधीच्या प्रदक्षिणा पथाला खालच्या बाजूने करण्यात आली आहे. समाधीच्या मुख्य घुमटाच्या भोवताली चारही बाजूने दोन दोन आणि कोपर्‍यावर एक असे एकूण बारा सुंदर छोटे मिनार आहेत.

हे सगळे बांधकाम निजामशाहीच्या काळातील आढळून येते. ही समाधी मालोजी राजांची असण्याची खात्री पटते कारण लखुजी जाधव यांची समाधी याच पद्धतीची सिंदखेड राजा येथे आहे. त्याच्या आधीचा कालखंड मालोजी राजांचा आहे. मालाजी राजांचा मृत्यू इंदपूरला झाल्याचे सांगण्यात येते. त्यावरून काही संशोधक ही समाधी मालोजी यांची नाही असे प्रतिपादन करतात. पण खुद्द लखोजी जाधव यांचाही मृत्यू देवगिरी किल्ल्यात झाला होता. त्यांची समाधी पण त्यांच्या मुळ गावी सिंदखेड राजा येथेच आहे. मालोजी राजांची गढी मंदिराच्या जवळच असल्याने ही समाधी त्यांचीच असण्याची जास्त शक्यता आहे. शिवाय शंभू महादेव हे भोसल्यांच कुलदैवत. तेंव्हा मंदिरा समोर समाधी असण्यासही एक संयुक्त कारण आहे. बाजूची रिकामी कबर कुणा सरदाराची असावी. पण त्याचे निधन दुसरीकडे झाले आणि मृतदेह तिथपर्यंत आणता आला नसल्याने ही जागा रिक्त राहिली. अशा पण काही कबरी याच परिसरांत आहेत. 


तिसरी जी समाधी आहे ती कुणाची आहे याची माहिती नाही. पायर्‍या नसल्याने गर्भगृहात जावून पहाता येत नाही. तिथे वटवाघुळांचा मुक्त संचार आहे. कसरत करत वर चढल्यावर गाभार्‍यात वटवाघूळांच्या विष्टेची प्रचंड घाण साठलेली दिसून येते. घाणीचा भपकारा इतका आहे की नाक झाकून घ्यावे लागते. ही समाधी आतून पूर्ण शाबूत आहे. बाहेरून बराचसा भाग ढासळला आहे. शिल्लक अवशेषांवरून मुळ समाधीची भव्यता आणि मुख्य म्हणजे नक्षीकामाचा दर्जा याची कल्पना येते.  


सुवर्णसिंहासनाचे पाय असतात तसे देखणे समाधीच्या चार कोपर्‍यात चार पाय कोरलेले आहेत. जे आजही संपूर्ण शाबूत आहेत. या समाधीला तळघर आहे. जे सध्या दगड लावून बूजून टाकलेले दिसते आहे. पश्चिमेच्या खिडकीला सुंदर नक्षीकाम केले असून राजस्थानी पद्धतीने समोर छज्जा काढला आहे. 


कबर, समाधी आणि छत्री असे तीनही प्रकार इथे आढळून येतात. इतिहास संशोधकांनी यावर अजून प्रकाश टाकायला हवा. मुळात घृष्णेश्वर परिसरांतील सर्व अतिक्रमणे हटवून तिथे स्वच्छता केली गेली पाहिजे. या जून्या वास्तूंभोवती संरक्षक भिंती उभारल्या गेल्या पाहिजेत. नुकतीच मलिक अंबर कबर आणि परिसराची ज्या प्रमाणे डागडुजी केली आहे तशी इथे करण्याची नितांत आवश्यकता आहे. 

मुळात आपल्याला जून्या वास्तुंबाबत अनास्था का आहे? नविन तर आपण तसं बांधूच शकत नाही तर किमान जतन तर केलं पाहिजे. हा संपन्न असा वारसा आहे. पाश्चिमात्य पर्यटक आपल्या देशांत केवळ आपल्या संपन्न इतिहासाचा वारश्याचा अभ्यास करायला येतात. त्यांची अपेक्ष किमान स्वच्छता असावी ही पुरातन स्थळं सुरक्षीत असावीत इतकीच आहे. ती पण आपण पूर्ण करत नसूत तर कुणावर आणि किती टिका करायची? 

मालोजी राजे हा मराठी अस्मितेचा विषय आहे. त्यांच्या नावाने नविन गढी उभारण्याची पुतळा उभा करण्याची आपल्याला मोठी हौस. पण त्यांचीच समाधी मात्र घाणीत सापडलेली. हा नेमका काय विरोधाभास?

समाधी कोणाची यावर तज्ज्ञांनी प्रकाश टाकावा. पण या समाधीची भव्यता, कारागिरी आणि तिचे स्थान भोसले घराण्यातीलच कुणा व्यक्तीची असल्याची ग्वाही देतात हे निश्चित.    

(फोटो सौजन्य : आकाश धुमणे, व्हिन्सेंट पास्किनली)

          श्रीकांत उमरीकर, जनशक्ती वाचक चळवळ, औरंगाबाद 9422878575  

शहाजी महाराजांची कार्कीर्द :-

    शहाजीराजे यांनीही आपला पराक्रम महाराष्ट्रासह महाराष्ट्राबाहेरही गाजवायला सुरुवात केली. तेव्हा मलिक अंबर हा निजामशाहीचा वजीर होता. त्याने शहाजीराजांची कर्तबगारी हेरून शहाजी राजांना मोठ्या हुद्द्यावर घेतले. त्यावेळी सिंदखेडराजाचे जाधव आणि वेरूळचे भोसले हे दोन्हीही मातब्बर घराणी होती आणि त्यांच्यात सोयर संबंध जुळवेत ही मलिक अंबरची इच्छा होती. त्यानुसार मलिक अंबरने मध्यस्थी जिजाऊ आणि शहाजीराजे यांचा विवाह जुळवून आणला. त्यावेळी राजधानीचे शहर गणल्या गेलेल्या दौलताबाद या शहरात शहाजी आणि जिजाऊंचा विवाह मोठ्या थाटामाटात पार पडला.

    कालांतराने निजामशाही आणि मुघल यांच्यात युद्ध वाढू लागले. त्यात सरदारांची फोडाफोडी होऊ लागली. त्यामुळे दक्षिणेतल्या राजकारणावर विपरीत परिणाम झाले. परिणामी भोसले आणि जाधव या दोन घराण्यात वादाची ठिणगी पडली. निजामशाहीत झालेल्या जाधवांच्या खुनानंतर शहाजीराजे भोसले वेगळे झाले आणि जिजाऊंचे माहेर त्यानंतर कायमचे तुटले. निजमशाहीच्या दरबारात खून प्रकरण घडले, तेव्हा शिवाजी महाराज हे पोटात होते. पुढे त्यांचा जन्म संगमनेरपासून काही किलोमीटर अंतरावर असलेल्या पेमगिरी या गावात होणार होता. पण, खून प्रकरणानंतर शहाजी राजांनी जिजाऊंना तिथून हलवले आणि अवघ्या ३ दिवसांत शिवनेरीवर सुखरूप पोहोचवले. त्यानंतर काही दिवसांनी शिवाजी महाराजांचा शिवनेरीवर जन्म झाला. त्यानंतरच्या काळात शहाजी महाराज आदिलशाहीकडे रवाना झाले. 
स्वराज्यात पुरंदरचा अवघड तह झाला आणि त्या तहानंतर शिवाजी महाराजांना बादशाह औरंगजेबाने दिल्लीला बोलवले. मिर्झाराजे जयसिंग यांच्या विनंतीवरून १६६५ रोजी शिवाजी महाराज दिल्लीला जाण्यास निघाले. शिवाजी महाराजांचा मार्ग रायगडावरून नगर-शेवगाव-पैठण आणि औरंगाबाद असा होता. संभाजी महाराज हेही सोबत होतेच. औरंगाबाद जिल्ह्यात आगमन झाल्यानंतर शिवाजी महाराजांचा पहिला मुक्काम पडला तो पैठणला. पैठणला मुक्काम झाल्यानंतर शिवाजी महाराज बिडकीन बाभूळगाव या मार्गे औरंगाबादेत दाखल झाले. शिवाजी महाराज औरंगाबादेत दाखल झाले तेव्हाचे वर्णन भीमसेन सक्सेना या समकालीन इतिहासकाराने नमूद करून ठेवलेले आहे आणि ते फार रोमांचक सुद्धा आहे. शिवाजी महाराज हे ५०० घोडदळ आणि ५०० पायदळ आणि इतर पूरक मनुष्यबळासह शहरात दाखल झाले होते. त्यावेळी त्यांचा लवाजमा हा डोळ्यात भरण्यासारखा होता.
        शिवाजी महाराजांचे मूळ वंशज याच भागातले होते. त्यामुळे त्यांचे चाहतेही औरंगाबाद आणि परिसरात खूप होते. त्यातच शिवाजी महाराजांनी स्थापन केलेल्या स्वराज्याची किर्तीही सर्वदूर पोहोचली होती. शिवाजी महाराज औरंगाबाद शहरात प्रवेश करत असताना भीमसेन सक्सेना संगतात त्याप्रमाणे, शिवाजी महाराजांना पाहण्यासाठी शहरातील आणि आसपासच्या खेड्यातील नागरिकांनी तुफान गर्दी केली होती. अनेक किलोमीटर चालून लोक शिवाजी महाराजांना पाहण्यासाठी आले होते. औरंगाबाद शहराची गल्ली-बोळ माणसांनी फुलून गेला होता. इतकी तोबा गर्दी झाली होती. तशी त्यांना भेटण्यासाठी हितचिंतकांचीही प्रचंड गर्दी राजवाड्यात झाल्याचा उल्लेख या समकालीन इतिहासकाराने केलेला आहे.
      शिवाजी महाराज हे औरंगाबाद शहरात दाखल झाल्यानंतर त्यांचा मुक्काम हा जयसिंग पुऱ्यातील मिरझा राजे जयसिंगच्या वाड्यात होता. त्या वाड्याच्या ठिकाणी आता श्रीकृष्ण अपार्टमेंट उभे असल्याचे अनेक इतिहासकार सांगतात. यानंतर तब्बल ३ दिवस शिवाजी महाराज हे औरंगाबाद शहरात मुक्कामी होते. या मुक्कामात त्यांनी आसपासचा बराचसा परिसर फिरला असल्याचेही अनेक दाखले उपलब्ध आहेत. यानंतर शिवाजी महाराजांनी औरंगजेबाने प्रवासासाठी उपलब्ध करून दिलेले १ लाख रुपये औरंगाबाद येथून घेऊन आग्र्यासाठी रवाना झाले.
     या ३ दिवसांशिवाय शिवाजी महाराज पुन्हा औरंगाबादला आल्याचा उल्लेख कुठेही आढळत नाही. मात्र, आग्र्याहून आक्रमण केले होते आणि सुरत प्रमाणेच जालन्याचीही बाजारपेठ लुटून नेल्याचे इतिहासात नमूद आहे.
   औरंगाबाद शहाराला पवित्र करून टाकणाऱ्या त्या ३ दिवसानंतर शिवाजी महाराज पुन्हा कधीही औरंगाबादेत आले नसले. तरी, त्यांची मुळे मात्र याच मातीतली होती.





वेरूळ हे शहाजीराजे भोसले यांचं मूळ गाव. आजही वेरूळात शहाजी राजांचे वडील आणि छत्रपती शिवाजी महाराजांचे आजोबा मालोजीराजे भोसले यांच्या गढीचे अवशेष पाहायला मिळतात. या गढीच्या भिंतींचे, बुरूजाचे आणि निवासस्थानाचे अवशेष आज इथे बघायला मिळतात. गढीच्या परिसरात 2004 ते 2006 दरम्यान राज्य पुरातत्व विभागातर्फे उत्खनन करण्यात आलं. "या उत्खननामध्ये मूदपाकखाना, खोल्यांच्या जोत्यांचे अवशेष, पूर्व-पश्चिम भिंतीचा काही भाग तसंच धान्य कोठारं मिळाली. याच ठिकाणी लाल दगडातील गणपतीची मूर्ती, चांदीची अंगठी, तांब्याची नाणी, भाजलेल्या मातीचे दिवे, गळ्यातील दागिना, प्राण्यांच्या मूर्ती, काचेचे आणि मौल्यवान दगड तसंच शंखाच्या आणि काचेच्या बांगड्या मिळाल्या. राज्य पुरातत्त्व विभागानं त्याकाळातल्या वस्तू जमा करून त्यांच्या कार्यालयात ठेवल्या आहेत.
  सध्या वेरूळ इथं या गढीच्या परिसरात सध्या एक ते पावणेदोन मीटर जाडीच्या आणि चार ते पाच मीटर उंचीच्या मातीच्या भिंती उभ्या आहेत. या भिंती उभारताना माती, तण आणि कोंडा याचा वापर झाला आहे. पाच मीटर उंचीचा बुरूज इथे आहे. 

मालोजीराजांच्या गढीचं संरक्षित क्षेत्र सोडून दर्शनी भागात शहाजीराजांचं स्मारक उभारण्यात आलं आहे.
   आता आपण येउया वेरूळ लेण्याच्या सविस्तर माहिती कडे. भारतीय शिल्पकलेचा एक उत्कृष्ट नमुना म्हणून वेरूळ लेण्यांकडे पाहिले जाते . हिंदू , बौद्ध आणि जैन संस्कृतीचे दर्शन घडविणारी शिल्पे या लेण्यांमधून आहेत. कळसापासून पायापर्यंत अशी निर्मिती झालेल्या कैलास लेणीतील कलाकुसर , कोरीव काम आश्चर्यकारक आहे . प्राचीन व्यापारमार्गाच्या छेदस्थानी वसलेल्या आणि शतकानुशतके पवित्र तीर्थक्षेत्र म्हणून ख्याती असलेल्या वेरूळचा उल्लेख अरब आणि युरोपियन प्रवाशांच्या प्रवासवर्णनामध्ये ठळकपणे आढळतो . चंद्रकोरीसदृश्य आकाराच्या डोंगरकुशीत वसलेली वेरूळ लेणी दख्खन पठाराभिमुख , दक्षिणोत्तर रेषेत वेरूळच्या डोंगरात सुळ्याच्या सहाय्याने कोरून काढण्यात आली आहेत . बौद्ध लेणी क्रमांक एक ते १२ची निर्मिती इसवी सन पाच ते सातव्या शतकादरम्यान , हिंदू लेणी क्रमांक १३ ते २९ची निर्मिती इसवी सन आठ ते नवव्या शतकादरम्यान आणि जैन लेणी क्रमांक ३० ते ३४ची निर्मिती इसवी सन नऊ व ११व्या शतकादरम्यान  करण्यात आली .


वेरुळ लेण्यांचा नकाशा
वेरुळ लेण्यांचा माहिती फलक

वेरुळ लेण्यांचा प्रत्यक्ष परिसर

 वेरुळ लेणे मुख्यत प्रसिध्द आहे ते कैलास लेण्यामुळे. कैलास लेणं हे संपूर्ण जगाला पडलेलं कोडं आहे. एकसंध खडकातून कोरण्यात आलेलं हे लेणं इ. स. 757 मध्ये राष्ट्रकूट राजवंश नरेश कृष्ण (प्रथम) यांच्या राजवटीत कोरण्यात आलं. १० व्या शतकात लिहण्यात आलेल्या कथा कल्पतरू नावाच्या ग्रॅंथात मंदीरासंबधीत एक लोककथा देण्यात आली आहे. या लोककथेनुसार ८ व्या शतकातील राष्ट्रकुट राजा ऐलूच्या पत्नीने स्वप्नात एक शिवमंदीर पाहिले. तिला स्वप्नामध्ये फक्त शिवमंदीराचा कळस दिसला. अशा प्रकारचे मंदीर आपण आपल्या राजामार्फत साकार करावे म्हणून तीने अन्नत्याग केला.आणि जोपर्यन्त मंदीर तयार होणार नाही, तोपर्यन्त आपण अन्न घेणार नाही अशी शपथ घेतली.
   राजाने शिखरापासून सुरवात करण्यासाठी वेगवेगळ्या शिल्पकारांना आमंत्रित केलं मात्र अशा प्रकारचं मंदीर उभा करणं अशक्य असल्याचं प्रत्येकाने सांगितलं. त्यानंतर पैठण येथून काकोसा नावाच्या शिल्पकाराला बोलवण्यात आलं.त्यांनीच दगडांमध्ये छिन्नी आणि हातोड्यामार्फत कोरीव काम करुन वरतून खालीपर्यन्त मंदीर उभा करण्याची कल्पना सांगितली. राष्ट्रकुट राजा कृष्ण प्रथम याच्या कारकिर्दीत मंदीरच कोरण्यास सुरवात करण्यात आली.   इस ७५७ ते ७७३ च्या काळात मंदीरचा बराचसा भाग कोरून पुर्ण करण्यात आला. राष्ट्रकुट घराण्याची राजधानी गुलबर्गा असल्याने या मंदीरावर द्रविड कलेचा प्रभाव पडला. 
  दूसरी शक्यता अशी देखील सांगण्यात येते की, मंदीर तयार करण्याची सुरवात इस ७३५ ते ७५७ या राष्ट्रकुटाच्या दंतिदुर्गा राजाच्या काळात बनवण्यात आला असेल. कारण मंदीर परिसरात दंतिदुर्गाचा एक शिलालेख देखील आढळला आहे. मंदीर कोणत्या काळात बांधण्यात आलं याबद्दल वेगवेगळ्या शक्यता वर्तवण्यात येत असल्या तरी राष्ट्रकुटांच्या काळात हे मंदीर बांधण्यात आल्यावर ऐतिहासिक तज्ञ ठाम असतात.अजिंठा लेणीसमूहाच्या निर्मितीनंतर विशेषतः पहिल्या क्रमाकांचा विहाराचा निर्माता राजा हरिषेणाच्या मृत्युनंतर वाकाटकांच्या वैभवशाली राजवटीचा लवकरच अस्त झाला. तदनंतरच्या धामधुमीच्या काळात चालुक्य, कलचुरी अशा राजवटींनंतर येथे राष्ट्रकूटांची प्रबळ सत्ता निर्माण झाली. कलचुरींच्या काळातच एलापूर - वेरूळ येथे लेण्यांची निर्मितीची सुरुवात होऊ लागली त्या शिल्पकलेचा राष्ट्रकूटांच्या कारकिर्दित कळस गाठला गेला. वाकाटकांच्या अस्तानंतर बेकार झालेल्या शिल्पकारांच्या पिढ्यांनीच वेरूळ निर्मितीस हातभार लावला असे काही संशोधक मानतात.
      वेरूळच्या लेण्यांमधील १ ते १२ क्रमांकांची लेणी बौद्ध, १३ ते २९ हिंदू आणि ३० ते ३४ जैन, अशी आहेत. क्रमांक १६ चे विख्यात कैलास लेणे आहे. बौद्ध लेणी : यांत बहुतांशी विहारगृहे आहेत फक्त एकच चैत्यगृह आहे. काही विहारगृहे शिल्पांनी आणि अलंकृत स्तंभांनी देखणी झालेली आहेत, तर काही अनेकमजली असल्याने भव्य वाटतात. ही सर्व प्रामुख्याने महायान पंथीयांची आहेत. काही गुंफांमधून वज्रयान प्रतिमांची सुरुवात झालेली दिसून येते.
  वेरुळ लेण्यांची पार्श्वभुमी समजावून घेतल्यानंतर आपण प्रत्यक्ष लेण्यांची माहिती घेउया. 
     अर्थात लेणी पाहताना बरेच कुट प्रश्न मनात येत रहातात. बहुतेक लेणी हि सुरवातीला व्यापारी मार्गावर पावसाळ्याच्या काळातील निवास म्हणजे वर्षावास म्हणून खोदली गेली. अर्थातच या कामासाठी आव्श्यक बाब म्हणजे धनाचा पुरवठा. सहाजिकच अशी लेणी कोरण्यासाठी राजाश्रय्,लोकाश्रय हे आवश्यकच होते. शिवाय लेणी कोरणे हे वर्षानुवर्ष चालणारे काम.त्यासाठी चिकाटीने काम करणारे आणि कोरीवकामातील शैली आणि सातत्य टिकवणार्‍या कारागिरांचा अखंड पुरवठा हि आवश्यक बाब होती.वेरुळ लेणी साधारणतः पाचव्या ते दहाव्या शतकाच्या कालखंडात कोरलेली गेली. सहाजिकच इतक्या मोठ्या कालावधीत हे काम चालू होते.याचा अर्थ केवळ हेच काम करत याच परिसरात कलाकार कायम स्वरूपी राहिले असणार. त्यांच्या जीवनशैलीचा विचार केला तर आपल्याला अनेक प्रश्न पडतात.
       लेण्यांचे कोरीवकाम करणार्‍या कलाकारांच्या एकंदरीत रोजच्या आयुष्यात काय होत असेल याचे कुतुहल वाटते. अनेक नवशिकाउ कलाकार इथे असतील.वयाने लहान असणार्‍या या नवयुवकांचे कौशल्य इथे बहरले असेल.ज्यांचा हात बसला आहे, असे कसबी कारागिर कामाची आखणी ,विभागणी करत असतील. अवघड आणि नाजुक काम स्वतःच्या जबाबदारीवर पार पाडत असतील. वयोवृध्द आणि अनुभवी जाणकार लोक कामावर लक्ष ठेवून गोष्टी सांगेण युक्तीच्या चार , या भुमिकेत असतील. अनेक नवयुवकांचे संसार या कामाला वाहुन घेतले असताना याच पाषाण पर्वताच्या कुशीत बहरले असतील. सहकुटूंब याच परिसरात घालवून कदाचित अनेकांची अखेरही येथेच झाली असेल. त्यांची पुढील पिढी दुसरे काहीही न शिकता आणि कदाचित दुसरा रोजगार न शोधता, इथेच आपल्या बापजाद्यांच्या हाताखाली शिकून आपल्या आयुष्याची वाटचाल याच परिसरात केली असेल.मुळात आयुष्याकडून फार मोठ्या अपेक्षा नसल्याने देखील तिथे राहणारी कुटुंब शेकडो वर्षे सुखाने राहिली असतील. हे जीवनचक्र थोडेथोडके नव्हे तर तब्बल पाचशे वर्ष चालले.किती पिढ्या यात खर्ची पडल्या, लेणी कोरताना किती आणि कोणत्या घटना घडल्या, अपघात झाले याची ना कसलीच नोंद,ना इतिहास यावर बोलतो.कदाचित वेरूळच्या पर्वताच्या पाषाण ह्रुदयाला हे मनोगत सांगावेसे वाटले आणि त्याला मनोगत सांगायची संधी मिळाली तरच या अबोल व्यथा, त्यागाच्या कथा आणि कारागिरीच्या मेहनतीच्या गाथा आपल्याला समजतील.



 वेरुळ लेण्यांची चित्र

वेरुळ लेणी, काही कुट प्रश्न :-

युनेस्कोच्या भारताच्या जागतिक वारसास्थळाच्या यादीत वेरूळचं नाव हे पहिल्या पाच स्थळांमध्ये येतं. या  मंदिराची निर्मिती ही 'आधी कळस मग पाया', या तत्त्वावर केली गेली आहे. भारतातील सगळ्या लेणी या एकतर खालून वर, नाही तर डोंगरफोडून समोरून आत अशा कोरलेल्या आहेत. मात्र कैलास मंदिराची निर्मिती अतिशय नियोजनबद्धपणे कळसापासून पायापर्यंत करण्यात आली आहे. कैलास लेणं  हे  मंदिर बनवण्यासाठी साधारण 150 वर्षं लागली असावी असं संशोधकांना वाटतं. हिमालयातील पांढऱ्या शुभ्र बर्फामध्ये कैलास पर्वतावर महादेवाचे वास्तव्य आहे, असं हिंदू पुराणांमध्ये म्हटलंय. त्यानुसार हे मंदिर जेव्हा पूर्ण झालं तेव्हा त्याला पांढऱ्या रंगाचा लेप लावण्यात आला होता. मात्र आता हा लेप काळाच्या ओघात निघून गेला आहे. तरीही काही ठिकाणी आपल्याला याचे अंश बघायला मिळतात.
वेरूळच्या लेणीखाली वसलेले होते गुप्त नगर !
              इतिहास  संशोधक डॉ. दुलारी कुरेशी सांगतात, "कैलास मंदिर निर्माण करताना एका मोठ्या शिळेला तीन भागांमध्ये वरून खालपर्यंत खोदण्यात आलं. या खोदकामात जवळपास 20 हजार टन दगड फोडून वेगळा करण्यात आला. लेणीच्या मध्यभागी जे मुख्य मंदिर आहे त्यामध्ये वरच्या बाजूला एक मोठे शिवलिंग आहे.
  या  शिवलिंगाच्या समोर मोठा महामंडप आहे. या महामंडपात अनेक मोठमोठे, सुंदर कोरीवकाम असलेले स्तंभ आहेत. तर मंदिराच्या छताच्या आतल्या बाजूस भगवान शिवाचं तांडव नृत्य करणारं शिल्प कोरण्यात आलं आहे.
   तसंच मंदिराच्या शिखरावर पाच सिंह कोरण्यात आले आहेत. आपण महाबलीपुरम येथे पाहिलं तर तिथेही सिंह, हत्ती कोरलेले आहेत. मात्र इथे कैलास मंदिरात या हे  प्राणी पूर्णाकृती रूपात पाहायला मिळतात. या संपूर्ण मंदिराची बांधणी एखाद्या रथाप्रमाणे असून हे मंदिर व्याळ आणि हत्ती यांसाख्या प्राण्यांनी डोक्यावर उचललेलं आहे.
    हे  मंदिर म्हणजे दक्षिण आणि उत्तर वास्तु स्थापत्यशैलीचा उत्कृष्ट नमुना आहे.  इथे समोरच्या बाजूला पाहीलं तर तुम्हाला गोपुरं दिसतात, तर पाठीमागच्या बाजूला शिखर दिसतात. तसंच या मंदिराच्या समोरील दोन्ही बाजूस दोन हत्ती आणि  दोन ध्वजस्तंभ कोरलेले आहेत."
20 हजार टन दगडांचं काय केलं?
    डोंगर  फोडून जेव्हा कैलास मंदिर बनवण्यात आलं, तेव्हा जवळपास 20 हजार टन खडक फोडून बाहेर काढण्यात आला. पण कैलास मंदिराच्या आसपासच्या परिसरात कुठेही या दगडाचे अंश दिसत नाहीत. त्यामुळे  एवढ्या मोठ्या खडकांचं नेमकं काय झालं, याबद्दल माहिती देताना डॉ. कुरेशी सांगतात की, "आपण पाहिलं तर कैलास मंदिराच्या जवळपास अनेक मंदिरं आहेत. तसंच मराठवाड्यातही अनेक मंदिरं आहेत, जी चालुक्य आणि राष्ट्रकूट काळात बांधण्यात आलेली आहेत. या मंदिरांचे बांधकाम कैलास मंदिर ज्या खडकामध्ये आहे त्याच खडकांत आहेत.
    मात्र  त्या मंदिरांच्या जवळपास कुठेही उत्खनन केलेलं नाही अथवा डोंगरही नाहीत. त्यामुळे कैलास मंदिराच्या निर्मितीमधून निघालेला खडक या मंदिराच्या निर्माणात वापरला असावा अशी शक्यता आहे. मात्र हे ठाम पणे सांगता येत नाही.
कैलास मंदिराखाली एक पुरातन शहर आहे का?
    कैलास  मंदिराबाबात अनेक गोष्टी बोलल्या जातात. मंदिराच्या चारही बाजूस गुहेप्रमाणे काही जागा आहेत. ज्या अतिशय खोलवर गेलेल्या आहेत. काही परदेशी संशोधकांच्या मते या मंदिराच्या जमीनीखाली एक पुरातन शहर असण्याची शक्यता आहे. तर काही संशोधक हे मंदिर परग्रहवासीयांनी उभारल्याचं सांगतात.
  जागतिक वारसास्थळ असलेल्या वेरूळ लेण्यांखाली कधीकाळी एक गुप्त नगर वसलेले होते, अशी नवीच माहिती समोर आली आहे. या नगरवासियांना हवा, पाणी व प्रकाश मिळावा यासाठी केलेली व्यवस्था आजही काही प्रमाणात उपलब्ध आहे. लीळाचरित्र तसेच पाश्चात्त्य तज्ज्ञांनी लिहिलेल्या पुस्तकांतही या गुप्त नगरीचा उल्लेख आढळला आहे. 
पुराणातील दाखले असे..
     १. महानुभव पंथाच्या चक्रधर स्वामींचे ११ महिने लेणीत वास्तव्य. लीळा चरित्रातील कवनात "हा अवघाची डोंगर पोकळू असे, एणीच जाणीचे रिग्ने कोणी नाही' (अर्थ : वेरूळचा डोंगर अत्यंत पोकळ आहे. यात कोणी गेले तर तो परत येण्याची शाश्वती नाही. तो अनाकलनीय आहे.) असा लेणीसंबंधी उल्लेख आहे.
२. चक्रधर स्वामींचे भक्त वेरूळ मुक्कामी असतांना रात्री घाबरून उठत. त्यांना विभिन्न आवाज येत असत. यावर चक्रधर स्वामींनी त्यांना एकत्र राहण्याचा सल्ला दिला. हा आवाज या नगरातील जनतेचा तर नसावा?
३. इतिहास आणि पुरातत्व शास्त्रातील बायबल मानले जाणारे जेम्स बर्जेस आणि फर्ग्युसन यांनी १८६०मध्ये लिहीलेल्या "दि केव्ह्ज ऑफ इंडिया' या पुस्तकात वेरूळच्या लेण्यांमागे काही लेण्या असल्याचा उल्लेख आहे. या लेण्या शंकराचे गुरूच्या भूमिकेतील रूप म्हणजेच लकुलीशाच्या होत्या. मात्र, नंतर कोणालाच त्या सापडल्या नाहीत. दबलेले शहर या लेण्या तर नसाव्यात?
४. डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील इतिहास विभागाचे संस्थापक डाॅ. गुप्ते यांनीही जेम्स बर्जेस आणि फर्ग्युसनने बघितलेल्या लकुलीशाच्या लेण्यांचा उल्लेख केलाय.
      तुर्कस्थानात लेणीखाली भूमिगत शहर तुर्कस्थानमध्ये डेरींकूयू लेण्यांखाली एक भूमिगत शहर सापडले आहे. विशेष म्हणजे हे शहर ८ मजली आहे. येथे २० हजार लोक रहात असावे, असा अंदाज आहे. अनेक वर्षे दबून राहिल्यानंतर १९६३ मध्ये ते जगासमोर आले. अशाच पद्धतीने वेरूळ परिसरातही उत्खनन करून भूमिगत शहराची माहिती जगासमोर आणण्याची गरज संशोधक व्यक्त करतात.
      शत्रूंपासून लपण्यासह मौल्यवान खजिना दडवण्यासाठी तसेच कारागिरांच्या निवासासाठी याचा वापर होत असावा, असा तज्ज्ञांचा अंदाज आहे. या नगरीवर आणखी संशोधन व्हावे, अशी अपेक्षा तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे.जर्मन पत्रकार आणि कैलास लेणीच्या अभ्यासिका क्रिस्टल प्लित्झ यांनी वेरूळच्या लेणीखाली गुप्त शहर असल्याचा दावा केला आहे. याबाबत यू-ट्यूबवहि काही संशोधकांनी व्हिडिओ अपलोड केले आहेत. या दाव्याची सत्यता पडताळली. संशाेधकांनी आपल्या म्हणण्याच्या पुष्ट्यर्थ काही पुरावे दिले आहेत. कैलास लेणीत एक आयताकृती बाेगदा आहे. काही अंतर पार करून गेल्यावर ती ९० अंशात वळते आणि पुढे निमुळती होत जाते. यापुढे ती कोठे जाते याची कोणालाच माहिती नाही. काहींच्या मते ती पुढे ४० फूट खोल अशा ठिकाणी घेऊन जाते. हेच ते नगर होते. काही भुयारी मार्ग अत्यंत निमुळते आहेत. तेथे माणूसही जाणे अशक्य आहे.लेणीत अनेक गुप्त रस्ते आहेत. परंतू ते पर्यटकांसाठी ३५-४० वर्षापासून बंद करण्यात आले आहेत.
   मंदीर परिसरात २ फुट आकाराचे खड्डे दिसतात.हि भुयार जमीनीत खोल गेलेली दिसतात. अर्थातच हि भुयार नैसर्गिक नसून मानवनिर्मित आहेत हे स्पष्ट आहे.मात्र इतक्या छोट्या आकाराची भुयारे एखादी व्यक्ति कसा कोरुन काढू शकेल ? असा प्रश्न उपस्थित होतो.मुख्य म्हणजे हि भुयार सरळ खोल न जाता थोड्या अंतरावर डावीकडे किंवा उजवीकडे वळाली आहेत. याशिवाय अगदी बोट जातील इतक्या छोट्या आकाराची छिद्र सुध्दा कोरली आहेत.मात्र इथे पर्यट्कांच्या वस्तु त्यात पडू लागल्या म्हणून हि छिद्र बंद केली गेली. जवळपास चाळीस फुट खोल हि छिद्र सरळ नसून नंतर डावीकडे किंवा उजवीकडे वळतात. कैलास लेण्यातील शिवपिंडीवर अभिषेक केला तरी ते पाणी जमीनीत मुरुन गायब होते.कितीही पाण ओतले तरी त्या छिद्रातून भरुन वर येत नाही. त्यामुळे कदाचित जमीनीखाली एखादे रहस्यमय शहर असावे असे अनेकांना वाटते.
वेरूळच्या लेणीखाली वसलेले होते गुप्त नगर !
कोणालाच जाता येत नव्हते तर ही भुयार कशासाठी तयार केली, असा संशोधकांपुढचा प्रश्न आहे.
वेरूळच्या लेणीखाली वसलेले होते गुप्त नगर !
लेणीत अनेक ठिकाणी वेगवेगळ्या आकाराची छिद्रे आहेत. काहींच्या मते यात बांबू रोवून वरचे काम केले जात असावे. काहींना तेव्हाचे लोक मसाले कुटण्यासाठी याचा वापर करत असावेत असे वाटते.
वेरूळच्या लेणीखाली वसलेले होते गुप्त नगर !
काहींना हे पाणी साठवण्याची सोय वाटते. परंतू काही छिद्रे खूप खोल आहेत. ती आता बुजवण्यात आली आहेत. संशाेधकांना ही छिद्रे खालच्या नगरीत हवा, पाणी आणि प्रकाश पोहचवण्यासाठीची सोय वाटते.

  अर्थात या बाबत विवीध तज्ञांची मते विचारात घेण्यासारखी आहेत. काही तज्ज्ञांच्या मते कधी खूप खोदल्यावर खराब दगड लागतो. मग काम अर्धवट सोडावे लागते. कदाचित वेरूळ खालील शहर अशा पद्धतीने अर्धवट सोडून दिलेले काम असावे. त्याचे वेगवेगळ्या ठिकाणी दाखले आहेत. या मार्गावर व्यापार करणारे व्यापारी मौल्यवान ऐवज आणि पैसे सुरक्षीत ठेवण्यासाठी अशा गोपनीय जागांचा आधार घेत असावेत, अशी शक्यता नाकारता येत नाही. तथापि, यावर संशाेधन, उत्खनन व्हावे.
 आणखी एक शक्यता म्हणजे पावसाचं पाणी मंदिर परिसरात थांबू नये म्हणून ड्रेनेज सिस्टिम बनवण्यात आलेली आहे. त्यामुळे या भागात कितीही पाऊस पडला तरी या मंदिरात पाणी थांबत नाही. ते सर्व पाणी या नाल्यांमधून जमिनीच्या आत निघून जातं. 
 - डॉ.दुलारी कुरेशी, इतिहास तज्‍ज्ञ आणि वेरूळ लेणीच्या अभ्यासिका
   आताचे वेरूळ हे तिसरे वेरूळ आहे. पहिले वेरूळ डोंगराच्या पायथ्याशी महानुभवांच्या आगमनापूर्वीचे होते. मात्र, प्लेगच्या साथीमुळे हे गाव ओस पडले आणि नदीपल्याड वसले. नंतर ते गावही गायब झाले आणि आताचे वेरूळ तयार झाले. कदाचित पाश्चात्य संशोधक जुन्या वेरूळचा उल्लेख करत असावेत.
- मधू कृष्ण जोशी, निवृत्त उपअधिक्षक, पुरातत्वविद्
   राष्ट्रकूटांच्या काळात अरबांचे आक्रमण होत होते. राष्ट्रकूटांनी ते थोपून धरले होते. पुढील धोके टाळण्यासाठी अशा प्रकारची सुरक्षित नगरी वसवली असण्याची शक्यता नाकारत येत नाही. लीळाचरित्रात याचा उल्लेख आढळतो. याबाबत आणखी अभ्यास व्हावा.
-डॉ.वि.ल.धारूरकर, वेरूळ लेणीच अभ्यासक
    गुप्त शहर होते किंवा नाही हा आत्मानुभूतीचा विषय आहे. काही पुरावे दुजोरा देणारे आहेत. काहींना छिद्रे किंवा भुयारी मार्ग हे जल व्यवस्थापनाची सोय वाटते. काही वर्षांपूर्वी कैलास लेणीसमोरील उत्खननात गावाचे अवशेष आढळले हाेते. कदाचित हे गाव लेण्यांखालपर्यंत असावे.
-मधुसूदन पाटील, वेरूळ लेणीचे गाईड व अभ्यासक
    अजून  एक गोष्ट आहे की, विदेशी संशोधकांना वाटतं की, इतकं सुंदर, इतकी अद्भूत वास्तू निर्मिती भारतीय कसे करू शकतात. त्यामुळे ते हे चमत्काराने अथवा परग्रहवासीयांनी बनवलं आहे असे सांगतात. मुळात त्या काळात म्हणजे इ.स. 600-800 या काळात भारतीयांकडे जे तंत्र होते, जे विज्ञान अवगत होतं, ते आजच्या काळापेक्षा फार पुढचं होतं. त्यामुळे हिडन सिटी अथवा एलियन हे काही नाही. हे आपल्या लोकांनी बांधलेलं आहे."

औरंगजेबाने कैलास मंदिर तोडण्याचा प्रयत्न केला का?
   औरंगजेब  आणि कैलास मंदिर यांच्याबद्दल एक संदर्भ दिला जातो, तो म्हणजे,  औरंगजेबाने हिंदूंची अनेक मंदिरं नष्ट केली.  मात्र तो जेव्हा कैलास मंदिर नष्ट करण्यासाठी आला तेव्हा त्याच्या 1000 सैनिकांनी 3 वर्षांपर्यंत मंदिर तोडण्याचे प्रयत्न केले मात्र तो या कामात यशस्वी होऊ शकला नाहीत.
     औरंगजेबचा इतिहास विचारात घेतला तर औरंगजेब इ.स. १६३६ ते इ.स. १६४४ औरंगाबादला वास्तव्यास होता आणि यानंतर पुढेही बराच काळ तो औरंगाबादला होता. तेव्हा तो वेरूळला नेहमी जायचा. जेव्हा  त्याने पहिल्यांदा कैलास मंदिर पाहिलं, तेव्हा तो म्हणाला 'अशी वास्तू मी  जगात कुठेही पाहिली नाही. हे कदाचित एखाद्या 'जीन'नेच बनवलं असावं, मनुष्य  एवढं सुंदर बांधूच शकत नाही... याचं वर्णन करायला माझी लेखणीही असमर्थ आहे.' हे त्याचे त्यावेळचे उद्गार होते, असं तात्कालिक लोकांनी लिहून ठेवलेल्या माहितीत मिळतं. त्यानंतर औरंगजेब कित्येकवेळा आपल्या आमिर-उमराव यांच्यासोबत, त्यांच्या कुटुंबीयांसोबत येथे यायचा.
     औरंगजेबाबद्दल अनेक अफवा आहेत की त्यांनी या मंदिराची नासधूस केली वगैरे... मात्र ते सत्य नाही. औरंगजेबाने जी काही मंदिरं उद्ध्वस्त केली, त्याची यादी आहे. त्या यादीत वेरूळच्या कैलास मंदिराचा कुठेही उल्लेख नाही,". मात्र  असं असलं तरी हिंदू मंदिरांबद्दल औरंगजेबचं वर्तन हे परस्पर विसंगत आणि विरोधी असल्याची नोंद इतिहासात असल्याचं इतिहास संशोधक इंद्रजीत सावंत सांगतात. ते  म्हणाले, "औरंगजेबाच्या मनावर जेव्हा जिहाद स्वार होता त्यावेळेस त्याने काशी विश्वेश्वराचं मंदिर पाडल्याचे पुरावे इतिहासात नोंद आहे. औरंगजेब त्याकाळी स्वतःला पीर समजायचा. स्वतःला जिंदा पीर म्हणवून घ्यायचा. ज्या वेळी औरंगजेबाने मराठाविरोधी लष्करी मोहीम सुरू केली, तेव्हा मराठ्यांच्या किल्ल्यांवरची मंदिरं पाडायला सुरुवात केली. विशेष म्हणजे या कामासाठी त्याने विशेष अधिकाऱ्यांची नेमणूक केली होती. मराठ्यांच्या ताब्यातील गड जिंकल्यानंतर तिथली दगडी बांधकामं असलेली मंदिर पाडण्याची जबाबदारी या अधिकाऱ्यांवर देण्यात आली होती.  अशा प्रकारे औरंगजेबाने मंदिरं पाडण्याचे दिलेल्या आदेशांची इतिहासात नोंद आहे. तर दुसऱ्या बाजूला काही मंदिरांना औरंगजेबानं इनाम देण्याचे देखील पुरावे इतिहासात उपलब्ध आहेत. ज्या बहादूरगडावर संभाजी महाराजांचे डोळे काढण्याचे क्रूर आदेश दिले होते त्या ठिकाणी औरंगजेबाचा मुक्काम होता. त्या मुक्कामाच्या ठिकाणी असलेल्या भिंतीला लागून असलेलं विष्णू मंदिर आजही सुस्थितीत आहे. नैसर्गिकरित्या या मंदिराची अवस्था खराब झाली असली तरी ज्या  ठिकाणी संभाजी महाराजांवर क्रूर अत्याचार करण्यात आले, त्या ठिकाणच्या मंदिराला हातही लावण्यात आला नव्हता हा विरोधाभास म्हणावा लागेल,"  असं इंद्रजीत सावंत यांनी सांगितलं. तर  कोल्हापूर मधील अंबाबाई मंदिरात खजिना असल्याची माहिती औरंगजेबाला झाली होती. मात्र हे मंदिर आजही सुस्थितीत आहे, असंही सावंत सांगतात. 
         दौलताबादचे  राजे हसन गंगू बहामनी यांनी देखील कैलास मंदिराला भेट दिल्याचं डॉ. कुरेशी सांगतात. "दौलताबादच्या किल्ल्यावर जेव्हा हसन गंगु बहामनी यांची ताजपोशी झाली, तेव्हा त्याला कोणी तरी सांगितले की, इथून जवळच काही लेणी आहेत. ज्या तुम्ही पाहून नक्कीच आश्चर्यचकीत व्हाल. तेव्हा बहामनी यांने त्या पाहाण्याचा निर्णय घेतला. त्यांच्यासाठी दौलताबाद ते वेरूळ रस्ता बांधण्यात आला. तसंच सर्व लेण्यांची स्वच्छता करण्यात आली.

 वेरुळ लेणी आणि चित्रकला :-

विहारांमधे कोरलेली जातककथा तसेच बुद्धाच्या जीवनप्रसंगांचा उल्लेख असणारी रंगेबिरंगी चित्रे हे अजिंठा लेणीचे प्रमुख वैशिष्ट्य. अजिंठा लेणीतील चित्रांची शैली जगप्रसिद्ध होऊन 'अजिंठा शैली (अजिंठा स्कूल ऑफ आर्ट्स)' ह्या नावाने ओळखली जाऊ लागली. ह्याच शैलीत काळानुरुप थोडाफार बदल होऊन अशी चित्रे वेरुळ लेणीत रंगवली गेली. ह्या शैलीला 'उत्तर अजिंठा चित्रशैली (पोस्ट अजिंठा स्कूल ऑफ आर्ट्स)' असे ओळखले गेले. ही चित्रे कैलास एकाश्ममंदिराच्या सभामंडपातील छतावर आणि नंदीमंडपातील छत आणि भिंतींवर दिसतात. याखेरीज एलापुरातील जैन लेणीतील क्र. ३२ व ३३ - इंद्रसभा व जनन्नाथसभा ह्या दोन लेण्यांतही फार मोठ्या प्रमाणावर दिसतात. कैलासातील चित्रांमध्ये काही पौराणिक प्रसंग, तसेच नक्षीचे रंगकाम केलेले दिसते तर जैन लेण्यांतील चित्रांमध्ये गोमटेश्वर, पार्श्वनाथ, महावीर यांची चित्रे, काही नृत्यप्रसंग, वाद्यप्रसंग, यक्ष-यक्षिणी तसेच फुलाफुलांची, चौकटीची असे नक्षीकाम चित्रांकित केलेले आढळते.


   वेरूळमधील शेवटच्या जैन लेणीच्या निर्मितीपर्यंत म्हणजे साधारण ११ व्या शतकापर्यंत ह्या चित्रांची निर्मिती होत राहिली. राष्ट्रकूटांच्या अस्तानंतर ह्या अजिंठा शैलीचा उत्तर अजिंठा चित्रशैलीच्या रूपाने असलेला उरलसुरला दुवाही निखळून गेला व चित्रशैली संपूर्णपणे लयास गेली.

उत्तर अजिंठा चित्रशैलीतील ह्या वेरूळलेण्यांतील डॉक्युमेन्टेशनचा शोध घेण्याचा मी बराच प्रयत्न केला पण त्याचे कुठलेही संदर्भ मला मिळाले नाहीत. त्यामुळे ह्या लेण्यांतील बहुतांश चित्रे नेमक्या कुठल्या प्रसंगांची आहेत हे सांगता येत नाही. पर्यायाने त्यांचे वर्णनही मला येथे देता येणार नाही. त्यामुळे आता पुढे फक्त येथील चित्रांची मोजकी छायाचित्रे देतो.उत्तर-अजिंठा चित्रशैली, ही मूळ अजिंठा शैलीचा र्हास होतानाच्या काळातली असावी, असे या चित्रांवरून वाटले. अर्थात सरसकटपणे असे म्हणणे योग्य ठरणार नाही, कारण प्रत्येक कलावंताचे कसब व समज हे कमी-जास्त असणारच, शिवाय हजारेक वर्षांनंतर उरल्या-सुरल्या चित्रांवरून काही मत प्रदर्शित करणेही फारसे योग्य नव्हे.
पूर्वी कला, कसब, कारागिरी वगैरे एका पिढीपासून पुढल्या पिढीत लहानपणापासून संक्रमित होत असल्याने आता आपल्याला कठीण वाटणारे काम सहजपणे केले जात असावे. (आताचा प्रत्येक कलावंत हा पुरेसा मोठा झाल्यावर आपापल्या कष्टाने सुरुवातीपासून कला शिकत असतो) तसेच एकाच चित्रात दोन-तीन चित्रकार काम करायचे, हे अजूनही राजस्थान वगैरेतील पारंपारिक चित्रात बघायला मिळते. म्हणजे एक जण आधी मानवाकृती काढणार, दुसरा फक्त डोळे रंगवणार, तिसरा झाडे, चवथा इमारती, पाचवा सोन्याचे काम करणार, वगैरे. असे पाश्चात्य कलेतही होते, गंमत म्हणजे हल्लीचे आघाडीचे म्हणवले जाणारे कलावंत (उदा. मनजीत बावा, गुजराल इ.) तर या सर्वांवर कडी करून दुसर्‍यांकडून संपूर्ण चित्र, मूर्ती इ. बनवून घेऊन स्वतः धंद्याची आघाडी संभाळत असतात.

     हि गुंफा चित्र बघताना काही प्रश्न मनात येतात. अंधारात चित्रे कशी रंगवली असतील ? या बद्दल दोन-तीन गोष्टी लक्षात घेतल्या पाहिजेत. प्रश्न नुस्ती चित्रे काढण्यापुरता नसून ती नंतर अनेक-- कदाचित शेकडो -- वर्षे बघितली पण गेली असणार.
   एक तर आजचा पर्यटक अल्प काळासाठी बाहेरील उजेडातून आत जातो, त्यामुळे जसे आपल्याला सिनेमा गृहात शिरल्यावर पहिली काही मिनिटे काहीच दिसत नाही, तसे होत असते, कारण डोळ्यांचे छिद्र ( aparture ) बाहेर असताना अगदी लहान असते, ते हळूहळू मोठे होते.गुहांमधे दीर्घ काळ बसून राहिल्यास हळू हळू चित्रे स्पष्ट दिसू लागतात याचा आपण अनुभव घेउ शकतो.
   दुसरे म्हणजे आजचा धूळ-प्रदूषणयुक्त शहरात, लहान लहान घरात राहणारा (हल्ली आपल्याला खूप दूरवर डोळे फोकस करण्याची सवय राहिलेली नाही) टीव्ही, मोबाईल, संगणक, वर्तमानपत्रे वगैरेंचा अतिरेकी वापर करणारा अधू दृष्टीचा माणूस आणि हजार वर्षांपूर्वीच्या, या सर्वांपासून मुक्त - नैसर्गिक वातावरणात राहणारा, नैसर्गिक अन्न खाणारा, दूरवर दृष्टीक्षेप करत राहणारा माणूस, यांच्या दृष्टी-क्षमतेतील फरक.
   उदाहरणार्थ आपण संग्रहालयात जुनी चिलखते , शस्त्रास्त्रे वगैरे बघतो, ती आपल्याला आज उचलता सुद्धा येणार नाहीत, ती अंगावर चढवून, मैलोनमैल पायी वा घोड्यावर दौडून पूर्वीचे सैनिक दिवस दिवस युद्ध करायचे. अर्थात तेंव्हाच्या आणि आताच्या मानवाच्या शारीरिक क्षमतेत खूपच बदल घडून आलेले आहेत.  

प्रत्येक चित्राचे छायाचित्र घेण्यासाठी येथे जवळपास २ दिवस ठाण मांडून बसावे लागेल. वेरूळला जेव्हा केव्हा याल तेव्हा ह्या उत्तर अजिंठा चित्रशैलीतील चित्रे पाहण्यास अजिबात विसरू नका.

 लेण्यांची वैशिष्ट्य :-
          उजवीकडून म्हणजे पहिल्या लेण्यांपासून आपण लेणी पहाण्यास सुरवात केली कि पहिल्या टप्प्यात बौध्द लेणी आहेत. साधारण एक ते नऊ लेणी रचना किंवा विन्यास आतून सारखाच आहे. साधारण एक मोठा सभा मंडप आणि दोन्ही बाजूनी लहान खोल्या म्हणजे विहार अशी यांची रचना आहे. मात्र आतलं दगडातील कोरीव काम अप्रतिम सुंदर आहे. या गुंफा बघताना लक्षात येते की कोणत्याही हवामानात सहज राहाता येईल अशी या खोल्यांची रचना वाटते आहे. सभागृहात आणि त्याला लागून असणाऱ्या त्या खोल्यांमध्ये आतवर सूर्यप्रकाश पोहोचणे शक्यच नाही. पण आत जाऊन बघितले तर छानसे कोनाडे आहेत. कदाचित त्याकाळात या कोनाड्यांमध्ये मोठे तेल दिवे ठेवत असतील. या खोल्यांच्या भिंती इतक्या जाड आहेत की उन्हाचा किंवा थंडीचा तडाखा आत जाणवू नये.
      कलादृष्टी असणाऱ्यांसाठी वेरूळ हे एक कलादालनच आहे. आजपासून दीडहजार वर्षांपूर्वी ही कलासाधना सुरु झाली आणि साधारण ६ शतके सातत्याने या शिल्प स्थापत्याचा अविष्कार घडत राहिला. आजच्या सारखी अत्याधुनिक साधने उपलब्ध नसतानासुद्धा हजार-दीडहजार वर्षापूर्वी हे सारे कसे घडले असेल हा विचार करतच आपण लेण्यांसमोर येवून पोहोचतो.
   क्रमांक एकच्या लेण्यांमध्ये लक्षणीय असे काही नाही पण क्रमांक दोन मधील ‘तारा’ ही बोधीसात्वाची मूर्ती मन मोहून टाकते. त्यानंतर आपण थेट लेणी क्रमांक पाचमध्ये जातो, येथे ११७ फूट लांबीचे व ५८ फूट रुंदीचे एक प्रशस्त दालन आहे.
  बौध्द कलेचा खरा अविष्कार दिसतो तो लेणी क्रमांक ६, १० आणि १२मध्ये. यातील विशेष लक्षणीय शिल्पे म्हणजे महामयुरी आणि हरीतीची शिल्पे. अलंकरण आणि एकूणच रचना वैशिष्ट्यपूर्ण आहे. महामायुरीच्या एका बाजूला चवरीधारिणी आहे तर खालच्या बाजूला एक भिक्षु मेजावर ग्रंथ ठेवून वाचतो आहे असे दिसून येते.
  विश्वकर्मा किंवा सुतारलेणी या लेण्यांचे छत कार्ले किंवा भाजे लेण्यांसारखे आहे, पण येथे लाकडाऐवजी दगडातूनच तुळया खोदण्यात आल्या आहेत. ही लेणी म्हणजे हीनयान आणि महायान या दोन्ही परंपरेचा समन्वय आहेत. येथे हीनयान परंपरेतला स्तुपही आहे आणि त्यासमोर महायान परंपरेतील बुद्धांची धीरगंभीर अशी मूर्तीसुद्धा.
लेणी क्रमांक ११मध्ये तर तीनमजली इमारत खोदण्यात आली आहे आणि त्यातल्या तिसऱ्या मजल्यावर अतिभव्य असा सभामंडप खोदण्यात आला आहे.
   वेरूळ समूहातील लेणी क्रमांक १ ते १२ मधून स्थापत्याची दिव्यता आणि भव्यता दिसून येते तर कैलास सारख्या लेण्यांमध्ये असंख्य कोरीव मूर्तींचे गोष्टीरुपाने दर्शन होते. मजल दरमजल करत आपण मुख्य आकर्षण असलेल्या कैलास लेण्यापर्यंत येऊन पोहोचतो.
    वेरूळच्या बौद्ध लेण्यांचा प्रारंभ सहाव्या शतकाच्या सुरुवातीस व्यापक प्रमाणात सुरू झाल्याचे दिसते. परंतु त्यातील अनेक प्रकल्प पुरेशा द्रव्यबळाअभावी इ. स. ६०० च्या आसपास बंद पडले असावेत. बौद्धांनी अर्धवट सोडलेल्या कित्येक गुंफा नंतर हिंदू लेण्यांमध्ये परिवर्तित केल्या गेल्या असाव्यात. हिंदू शिल्पप्रवृत्तीचा पहिला टप्पा प्रामुख्याने पाशुपत शैव संप्रदायाशी निगडित आहे. सहाव्या शतकाच्या सुरुवातीपासून ते चालुक्यांच्या कलचुरींवरील निर्णायक विजयापर्यंत-म्हणजे सातव्या शतकाच्या सुरुवातीपर्यंत-तो पूर्ण होतो. दुसरा टप्पा राष्ट्रकूटांच्या प्रवर्धमान शासनकाळात भक्तिसंप्रदायाच्या छटा दाखवणारा तर तिसरा टप्पा, ज्यात प्रामुख्याने जैन लेणी येतात, तो उत्तर राष्ट्रकूट काळात म्हणजे दहाव्या शतकाच्या शेवटीशेवटी पूर्ण झालेला दिसून येतो. यादवकाळातही काही तुरळक काम येथे झाले असावे. आठव्या शतकात येथील स्थापत्यकलेला बहर आला आणि सर्वोत्कृष्ट निर्मिती या काळात झाली.

बौद्ध लेणी

यांत बहुतांशी विहारगृहे आहेत, फक्त एकच चैत्यगृह आहे. काही विहारगृहे शिल्पांनी आणि अलंकृत स्तंभांनी देखणी झालेली आहेत, तर काही अनेकमजली असल्याने भव्य वाटतात. ही सर्व प्रामुख्याने महायान पंथीयांची आहेत. काही गुंफांमधून वज्रयान प्रतिमांची सुरुवात झालेली दिसून येते.ह्या लेण्या  महायान कालखंडाच्या शेवटी शेवटी खोदल्या गेलेल्या म्हणजेच साधारण ६ व्या ते ८ व्या शतकात खोदल्या गेलेल्या. महायान कालखंडात बौद्धांमध्ये मूर्तीपूजेचा प्रसार झाल्यामुळे ह्या लेण्यांमध्ये बोधीसत्वांच्या मूर्तींबरोबरच तारा, भ्रुकूटी, जम्भाल्, हरिती, महामयुरी अशा काही आगळ्यावेगळ्या मूर्ती कोरलेल्या दिसतात.एकंदरीत वेरुळ लेणी समुहात बौध्द लेणी आधी खोदण्यास सुरवात झाली, त्यामुळे बौध्द लेणी या पहाडात मोक्याच्या जागी असलेली जाणवतात. 
  वेरूळ लेण्यांतील बौद्ध लेण्या दक्षिणाभिमुख आहेत. बऱ्याच लेण्यांतून कलात्मकतेबरोबर भव्यतेचा आविष्कार जाणवतो. औरंगाबादनजीकच्या अजिंठा लेण्यांतील भित्तीचित्रांचे वैशिष्टय़ येथे जाणवत नाही. गौतमबुद्ध आणि बुद्ध धर्मीय देवतांना या लेण्यांतून महत्त्व देण्यात आल्याचे जाणवते. बुद्धाच्या विविध शैलीतील लहान-मोठय़ा मूर्ती कोरण्यावर आपले लक्ष केंद्रित केल्याचे जाणवते. या बौद्ध लेण्यांतील क्र. १० चे लेणे म्हणजे कल्पकता, कला आणि प्रगत वास्तुशास्त्राबरोबर नव्या-जुन्यांचा सुनहरा संगम आहे. क्र. ११-१२ लेण्यांना भव्यता आहे. हे लेणे सुरुवातीस दोन मजलीच होते, परंतु तळमजल्यावर उत्खनन केल्यावर ते मूळचे तीन मजली असल्याचे निष्पन्न झाले. बौद्ध लेण्यांतून सर्वत्र विविधता आणि कलात्मकतेचेही दर्शन घडते. बुद्धाच्या विविध मूर्तीव्यतिरिक्त मानवी जीवनाला आधार ठरलेले पशु-पक्षी यांच्याबरोबर वनसंपदा दाखवण्यापाठीमागे त्या काळचे वृक्षसंवर्धनाचे महत्त्व सांगण्याचाच जणू प्रयास आहे.

क्रमांक 1 : हे लेणे शिल्परहित विहार आहे. भिक्षूंना निवासासाठी एकूण आठ खोल्या आहेत.खांबाशिवाय खोदलेली ही गुंफा वेरूळ येथील सर्वात जुनी गुंफा आहे. या लेणीत गाभारा नाही तसेच कुठल्याही प्रकारची मूर्ती अथवा प्रतिमा नाही. वेरूळची ही पहिल्याच क्रमांकाची लेणी अगदी प्राथमिक स्वरूपातील आहे.या लेण्याला देढवाडा असेही म्हणतात.या गुंफेचा आकार ४१ फुट ६ इंच व ४२ फुट रुंद आहे.आतमध्ये मागच्या बाजुला चार तर दक्षीण बाजुला चार असे आठ विहार आहे.या लेण्याचा दर्शनी भाग नष्ट झाला आहे.या लेण्याचा एकच स्तंभ शिल्लक राहीलेला दिसतो. 

 

 

 

 

 

 

 

 

 






 लेणी क्र. १ ते ४ चा नकाशा

क्रमांक 2 :

हे लेणे मंदिर आणि निवास अशा दोहोंसाठी उपयोगी पडत असावे. मात्र यात फक्त दोनच खोल्या निवासासाठी आहेत. मागील भिंतीत गर्भगृह व बाजूच्या बुद्धमूर्ती असलेल्या भिंती येथे आहेत. गर्भगृहात धर्मचक्रप्रवर्दनमुद्रेत सिंहासनावर बुद्धाची मूर्ती असून, डाव्या बाजूस अवलोकितेश्वर बोधिसत्त्वाची मूर्ती आहे. उजव्या बाजूच्या दुसऱ्या बोधिसत्त्वाच्या मुकुटात स्तूपाची प्रतिमा आहे. गर्भगृहातील बुद्धमूर्तीच्या वर दोन्ही बाजूंना फुलांची माळ घेतलेल्या गंधर्वांच्या मूर्ती आहेत. गर्भगृहाच्या बाहेर दोन्ही बाजूंना द्वारपाल असून त्यांतील (डाव्या बाजूचा) अक्षमाला आणि कमलपुष्प घेतलेला पद्मपाणी अवलोकितेश्वर आहे. उजव्या बाजूचा द्वाररक्षक उत्कृष्ट शिरोभूषणांनी अलंकृत केलेला वज्रपाणी अवलोकितेश्वर आहे. ही मूर्ती काहींच्या मते बोधिसत्त्व मंजुश्रीची असावी.
 
 
  
 
या लेणीत गोल स्तंभशीर्षांचे कोरीवकाम आहे.मुख्य प्रवेशद्वाराच्या आत डाव्या भिंतीमध्ये एका स्त्रीदेवतेची मोठी मूर्ती आहे. गाभाऱ्यात बसलेली बुद्धप्रतिमा असून बुद्धाचे पाय उमललेल्या कमलासनावर टेकलेले आहेत. बुद्ध बसलेले आसन चौकोनाकृती व त्यावर सिंहप्रतिमा कोरलेल्या आहेत. मूर्तीच्या दोन्ही बाजूला  चामरधारी बोधिसत्त्वे आहेत. या लेण्याला प्रवेशमंडप असावा पण तो आता अस्तित्वात नाही. यात अत्यंत प्रेक्षणीय अशी जंभालाची (बौद्ध धर्मीयांचा कुबेर) मूर्ती आहे. त्याच्या बाजूस चवरी घेतलेले सेवक आहेत.
      या प्रवेशमंडपातून आत गेल्यावर बारा खांबांचा चौकोनी मंडप आहे. त्या मंडपाच्या दोन्ही बाजूंस प्रचंड आकाराच्या पाच बुद्धमूर्ती आहेत.
ही लेणी काही काळ हैदराबादच्या निजामाच्या नियंत्रणात होती

क्रमांक 3 : 

शिल्पे, शिल्पपट आणि अलंकृत स्तंभ ही या पडझड झालेल्या लेण्याची वैशिष्ट्ये आहेत. त्याच्या उत्तरेकडील भिंतीवर एक शिल्पपट आहे. अग्नी, मारेकारी आणि जलप्रवासातील आपत्ती यांच्यापासून अवलोकितेश्वर संरक्षण करीत आहे, अशा आशयाचा हा शिल्पपट असून यातच उजव्या बाजूला सिंह, नाग, हत्ती व पिशाच्चे यांसारख्या आपत्तींपासूनही तो रक्षण करतो, हे या शिल्पातून दाखविले आहे. बुद्ध आणि बोधिसत्त्वाचे बदलते आणि भौतिकतेकडे झुकणारे स्वरूप या शिल्पपटातून सूचित होते. 

लेणी क्र. ३ चा नकाशा
Cave 3, Ellora (photo: Sailko, CC BY 3.0)

 

 मध्यभागी असलेल्या मंडपात बारा खांब असून त्यांवर पूर्ण कलश आणि पत्रपल्लवी कोरलेल्या आहेत. मंडपाच्या बाजूच्या दोन्ही भिंतींत आठ, तर गर्भगृहाच्या दोन्ही बाजूंसही दोन खोल्या असून गर्भगृहात बुद्धमूर्ती आहे. द्वारपालांपैकी डाव्या बाजूची मूर्ती अवलोकितेश्वराची आहे.



 
 या लेण्याच्या उत्तरेच्या भिंतीत प्रलंबपाद आसनातील, धर्मचक्रप्रवर्तन मुद्रेतील बुद्धमूर्ती व अवलोकितेश्वराचा शिल्पपट आहे. उजव्या भिंतीवर तारा व वज्रयान दैवतसमूहातील देवतेचे शिल्प आहे.



क्रमांक ४ : हे दुमजली लेणे असून दुसऱ्या मजल्यावर बुद्धाची प्रतिमा आणि दोन लहान खोल्या आहेत. बुद्धमूर्तीच्या डाव्या बाजूस कमलनालधारक अवलोकितेश्वर आहे. 
भद्रासन बुध्द आणि तारा

बोधिसत्त्वांच्या शेजारी स्त्री-सेविका आहेत. याशिवाय कमलपुष्प हातात धरलेली तारा आणि कमंडलू धरलेल्या भृकुटीचे शिल्प आहे.

क्रमांक ५ : 

हे लेणे सर्वांत प्रचंड (३५·६६ X १७·६७ मी.) आहे. या लेण्याला `महारवाडा' असे नाव प्रचलित असले, तरी `महाविहार' याचा हा अपभ्रंश असावा. 

महारवाडा लेण्याचा तलविन्यास
a

या लेणी समूहात विहार, प्रार्थनागृहे, बौद्ध भिक्खूंची निवासस्थाने, स्वयंपाकघर, अशी रचना दिसते

 

गाभारा, दालन, मुख्य मंडप आणि दोन्ही बाजूंच्या पडव्या अशी याची विभागणी करता येते. दहा खांबांच्या दोन रांगांमुळे निरुंद पडव्या निर्माण झाल्या आहेत. दर्शनी भागात चार स्तंभ आहेत, तर पाठीमागे अंतराल असून भिंतीत मध्यभागी बुद्धप्रतिमा असलेले मंदिर आहे. अंतरालाला लागून दोन खोल्या, तर मंडपाच्या लगत एकूण सतरा खोल्या आहेत. सर्वसाधारणपणे या लेण्याची रचना चैत्यगृहाप्रमाणे आहे; परंतु गाभाऱ्याची बाजू अर्धगोलाकृती नाही. लेण्याचे छतसुद्धा सपाट आहे. चैत्यगृहामध्ये आढळतो तसा स्तूप नाही; प्रदक्षिणापथही नाही. 

 

गाभाऱ्यात प्रलंबपादासनात बसलेली बुद्धाची मूर्ती धर्मचक्रप्रवर्तनमुद्रेत आहे. 

 

मंदिराबाहेर डाव्या बाजूची अवलोकितेश्वराची मूर्ती कमलनाल आणि अक्षमाला घेतलेली आणि खांद्यावर मृगाजिन ल्यालेली आहे; तर दुसरी मुकुटधारी व अलंकार ल्यालेली आहे.

गौतम बुद्धाची शिल्पे, बोधिसत्वांच्या मूर्ती, यांची शिल्पे येथे प्रामुख्याने पहायला मिळतात

क्रमांक ६ :

वास्तुविधानाच्या दृष्टीने या लेण्याचे तीन भाग पडतात. यांतील दर्शनी भागाचे स्तंभ शालभंजिकांच्या सुंदर शिल्पांनी अलंकृत केलेले होते, असे त्यांच्या अवशिष्ट स्वरपावरून दिसते. 

लेणे क्र. ६ चा नकाशा
 

मधल्या भागात मंडप, त्यामागे अंतराल आणि त्यामागे बुद्धमंदिर आहे. दोन्ही बाजूंस दोन मोठे मंडप आणि बाजूंना नऊ खोल्या आहेत. मुख्य मंडपाचे छत कोसळल्यानंतर लाकडी छत बसविल्याच्या खुरा येथे दिसून येतात. स्तंभावर घटपल्लव (कलश आणि त्यातून डोकावणारी पाने) कोरलेले असून स्तंभाच्या वरच्या भागावर शार्दूल हस्त (ब्रॅकेट) आहेत.

 

 

महामयुरी

 अंतरालात द्वारपाल वज्रपाणी व अवलोकितेश्वर यांच्या भव्य मूर्ती आहेत. त्यावर पुष्पहार घेतलेले विद्याधर आहेत. डावीकडील भिंतीवर तारादेवी आणि उजव्या भिंतीवर महामयूरी यांची सुंदर शिल्पे आहेत. मयूरवाहनाखालील बाजूस पोथी वाचत असलेला भिक्षू कोरलेला असून वर अंतराळात विद्याधर दाखविलेले आहेत. येथील गाभाऱ्याची द्वारशाखा अलंकरणामुळे उल्लेखनीय ठरते. यातील गंगा-यमुनेच्या लहान मूर्ती अत्यंत नेटक्या आहेत.

क्रमांक ७ : 

हे लेणे शिल्परहित असून अपूर्ण आहे.हे लेणे म्हणजे विहार आहे.याचा आकार ५१ फुट ६ इंच लांब तर ४३ फुट ६ इंच रुंद असा आहे.याच्या छताला आधार देण्यासाठी चार चौकोनी स्तंभ कोरले आहेत. गुंफेमध्ये मागच्या बाजुला पाच आणि बाजुच्या भिंतीत तीन खोल्या आहेत.

इथले भव्य द्वार मंडप, दोन अति उंच स्तंभ, पूर्ण आकाराचा दगडात कोरलेला भव्य हत्ती, त्यावरील शिल्पकला हे सारे विलक्षण आहे

 प्रार्थनागृह असलेले १० क्रमांकाचे विश्वकर्मा लेणे हे या लेण्यात वैशिष्ट्यपूर्ण मानले जाते

 या वास्तूत जे स्तंभ कोरलेले आहेत त्यावर नृत्य व संगीतात मग्न असलेल्या शिल्पाकृती कोरलेल्या आहेत.

क्रमांक ८ : या लेण्याचे वैशिष्ट्य म्हणजे, गाभाऱ्यातभोवती प्रदक्षिणापथाची सोय हे होय. स्वतंत्र गर्भगृह व बोधिसत्त्व (अवलोकितेश्वर, वज्रपाणी), जंभाल (पांचिक) व हारिती (एक देवता) यांच्या मूर्ती येथष आढळतात. गर्भगृहात प्रलंबपादासनातील बुद्धमूर्ती असून तिच्या दोन्ही बाजूंस वज्रपाणीची आणि मंजुश्रीची मूर्ती आहे. मंजुश्रीच्या शिरोभूषणात स्तूप कोरलेला आहे. या मूर्तीची स्त्री- सेविका तिच्या वैशिष्ट्यपूर्ण केशरचनेमुळे लक्षणीय वाटते. अंतराळाच्या उजव्या भिंतीवर महामयूरीची मूर्ती आहे. गर्भगृहासमोर मंडप आहे. यात तारा त्याचप्रमाणे जंभाल व हारिती यांच्या मूर्ती आहेत.
 या ठिकाणी चैत्य विहार आणि स्तूप असून स्तूपात बैठी बुद्धमूर्ती आहे

क्रमांक ९ : कोरीव दर्शनी भाग, प्रमाणबद्ध खांब, पद्मपाणी आणि तारा या देवतांचा प्रार्थनापट ही या लेण्याची वैशिष्ट्ये होत.या लेण्याची रचना पुढे खुली ओवरी आणि मागच्या बाजुला स्तंभ असलेला मंडप अशी आहे. लेण्याच्या दर्शनी भागात पाच चैत्यकमानी कोरल्या असून इथे अवलोकीतेश्वराच्या मुर्ती कोरल्या आहेत. इथले महत्वाचे शिल्प म्हणजे तारा आणि बोधिसत्व यांची आहेत. लेणी मंडप तीन भागात विभागला असून मधल्या कक्षात बुध्दाची बसलेली मुर्ती वर चार गंधर्व कोरले आहेत. डाव्या कक्षात पद्मपाणी बुध्द आणि दोन सेविका व दोन गंधर्व यांची शिल्प दिसतात. तर उजव्या कक्षात इंद्र, मंजुश्री आणि वज्रपाणी व दोन सेविकांची शिल्प दिसतात.

क्रमांक १० : 

   हे लेणे `विश्वकर्मा' लेणे किंवा `सुतार' लेणे या नावाने विख्यात आहे. हे लेणे म्हणजे एक चैत्यगृह  आहे.यात लाकडी बांधणीच्या चैत्यगृहाचा ठसा उमटलेला दिसतो व त्यामुळे या लेण्याला सुतार लेणे असे नाव पडले असावे. हे लेणे चैत्यगृह या प्रकारात समाविष्ट होत असले, तरी पूर्वीच्या चैत्यगृहांचा नालाकृती दर्शनी भाग व रचना आणि या चैत्यगृहाचा त्रिदलसदृश दर्शनी भाग व योजना यांत फरक दिसून येतो. हे चैत्यगृह अजिंठा येथील महायान चैत्यगृहाच्या प्रकारातच मोडते. अर्थात हे चैत्यगृह अजिंठा येथील चैत्यगृहापेक्षा वास्तुशास्त्रदृष्ट्या आणि मुर्तीशास्त्रदृष्ट्या अधिक विकसीत आहे. याचा आकार १३.११ मीटर रुंद , २३ मीटर खोल आणि १०.२६ मीटर उंच असून हे लेणे अजिंठा येथील महायान लेण्यांपेक्षा मोठे आहे.  या चैत्यगृहाला वरचा मजला असून सज्जा कोरलेला आहे. सज्जाच्या कठड्यावर अनेक लहान शिल्पाकृती कोरलेल्या आहेत. सज्जाच्या आतील भिंतीवर भरतनाट्यम  नृत्यप्रकार करणाऱ्या एका नर्तकीचे शिल्प कोरलेले आहे. चैत्यगृहाच्या मुख्य कमानीवर तीन अर्धवलये कोरलेली आहेत. त्यांना त्रिदली बिल्वतोरण असे म्हणतात.
विश्वकर्मा लेण्याचा नकाशा

आधीची चैत्यगवाक्षे (कार्ले, भाजे येथील) इथे अभावानेच आढळतात. `हे चैत्यगृह भारतीय शैलगृहामधील अखेरची कलाकृती' असल्याने चैत्यगृहांच्या मांडणीत किती आणि कसा फरक होत गेला, याचे प्रत्यंतर हे लेणे पाहताना येते. येथे काष्ठकामाची परंपरा खडकाच्या कोरीव कामातही जोपासली गेली. त्यामुळेच या लेण्याच्या दक्षिणेकडील व्हरांड्यात तुळ्या आणि लगी खडकातच कोरलेल्या आहेत.

  
a
 
 
  लेणी क्र. १०. चैत्यगृह
 
 या लेण्याचे सौंदर्य दरवाज्यातून डोकावल्याखेरीज उलगडत नाही. आत प्रशस्त प्रांगण असून त्याच्या दोन्ही अंगांना खांबांचे सोपे आहेत आणि समोरही ओसरी आहे. याच्या प्रांगणाच्या भिंती अजून सुस्थितीत आहेत. या प्रांगणाच्या तिन्ही बाजुला बारा स्तंभावर पेललेला स्तंभमुखी ओसरी आहे.ओसरीच्या दोन्ही बाजुला मंदीर असून त्याच्याजवळ एक दालन खोदलेले दिसते. चैत्यगृहात असलेल्या सव्वीस स्तंभ साधे अष्टकोनी असुन त्याच्यावर अंजली मुद्रा धारण केलेले भक्त दाखवलेले आहेत. प्रवेशद्वाराच्या बाजूला एका कोनाड्याच्या भिंतीवर दोन ओळींमध्ये लिहिलेला ब्राम्ही लिपीतील शिलालेख आहे. 
   विश्वकर्मा लेण्याचा दर्शनी भाग इतर लेण्यांहून वेगळा व कलात्मक आहे. वरच्या मजल्याच्या आत जी भिंत आहे, तीत मध्यभागी एक द्वार असून त्यातून चैत्यमंदिरात प्रवेश करता येतो. या द्वाराभोवती साधारणतः त्रिकोणी कपाटात मुख्य तोरण आणि गवाक्ष, त्रिकोणाच्या दोन्ही बाजूंस कुंभ, अर्धस्तंभ आणि वळणदार पालवी यांचे मिळून झालेले गोष्ठपांजर, तर दरवाज्याच्या माध्यावर स्तंभशीर्ष किंवा प्रस्तर आणि यावर जवळजवळ वर्तुळाकृती गवाक्ष; आणि गवाक्ष, प्रस्तर आणि द्वार या सर्वांना सामावून घेणारी त्रिदली महिरप आहे. दोन दले जोडून त्रिदलासारखी एक नावीन्यपूर्ण आकृती लक्ष वेधून घेते. हिच्या दोन्ही बाजूंना शिखरांच्या प्रतिकृती कोरलेल्या आहेत. गवाक्षाच्या दोन्ही बाजूंस अंतरिक्षात गंधर्व-दांपत्ये कोरलेली आहेत. द्वाराच्या एका बाजूला अवलोकितेश्वर व दुसऱ्या बाजूला वज्रपाणी आहेत. प्रत्येक कोनाड्यात प्रणयी युग्मे कोरलेली आहेत. मिथुने आणि गण यांची रेलचेल आहे. चैत्यमंदिराचे स्तंभ साधे असले, तरी त्यांच्यावरील तुला आणि स्तंभशीर्षे यांवर यक्षशिल्पे आहेत.

प्रांगणाच्या तिन्ही बाजूंचे स्तंभ घटपल्लवयुक्त असून ते वरचा मजला तोलन धरतात. प्रवेशमंडपाच्या मागच्या भिंतीत असलेल्या दरवाजातून चैत्यगृहात जाता येते. हे चैत्यगृह गजपृष्ठाकृती आकाराचे असून त्यामध्ये एक मोठा स्तूप कोरलेला आहे. स्तुपाची उंची ८.२३ मीटर आहे. स्तुपावर असलेला यष्टीभाग आज अस्तित्वात नाही.हा स्तुप अजिंठा येथील लेणी क्र. १९ व २६ या स्तुपांपेक्षा वेगळा आहे.  या स्तूपाच्या दर्शनी भागावर बोधिवृक्षाखाली प्रलंबपादासनातील धर्मचक्रप्रवर्तनमुद्रेतील बुद्धमूर्ती (४·८७ मी. उंच) असून त्यांचे हात धर्मचक्रपरिवर्त्न मुद्रेत आहेत. मुर्तीच्या पीठावर आणि सिंहासनाखाली चंद्रशीला दाखवली आहे. बुद्धमूर्तीच्या डोक्यावर कमान असून दोन्ही बाजूंस बोधिसत्त्वाच्या मूर्ती व त्यावर आकाशात विहार करणारी गंधर्व -मिथुने बुद्धावर पुष्पवर्षाव करीत आहेत,  छताजवळील पाटिकेवर बुद्ध, बोधिसत्त्वांच्या मूर्ती असून त्यांच्या खाली बुटक्या व स्थूल गणांची रांग कोरलेली आहे. त्यावर नागदेव व नागदेवी यांची शिल्पे आहेत. यांच्या मागून बहिर्गोल फासळ्या निघताना दाखविलेल्या आहेत.
  वास्तविक स्वतः गौतम बुद्ध मुर्तीपुजा न मानणारे होते, तरीही आपलयाला गौतम बुद्धाच्या एवढ्या मूर्ती बनवण्यात आल्याचे दिसते. थेरवादी किंवा हिनयान पंथांत मूर्तीपूजा प्रचलित नव्हती. पण नंतर धर्मप्रसार करतांना बौद्ध उपासकांना बुद्धाच्या सगुण रूपातल्या प्रार्थनेची गरज भासू लागली तेव्हा पहिल्या शतकात कुशाण सम्राट कनिष्काच्या अध्यक्षतेखाली काश्मिरमध्ये झालेल्या चौथ्या धम्मपरिषदेत बुद्धमूर्ती स्थापन करण्यास मान्यता देण्यात आली व बौद्धांमध्येही मूर्तीपूजेला प्रारंभ झाला. सुरुवातीला केवळ विहारांमध्ये मर्यादित असलेल्या ह्या प्रतिमा नंतर मात्र खुद्द स्तूपांवरही कोरण्यात येऊ लागल्या व स्तूप उभारणीचा मूळ उद्देश लयास जाऊन चैत्य अधिक भरजरी होऊ लागले. बौद्ध धम्मात बुद्धमूर्तीला मान्यता मिळायच्या आधी गौतम बुद्ध दाखवायचे असल्यास कमळ, पदचिह्न वगैरे प्रतिकात्मक रूपात दाखवले जायचे.
      
 
 
   



  केवळ बौद्धधर्माच्या प्रसाराचा दृष्टिकोन न ठेवता कलाकारांनी सौंदर्याभिरूची या लेण्यात दाखवल्यामुळे सुरुवातीच्या काळात  खोदलेल्या इतर लेण्यांपेक्षा स्थापत्यकलेच्या दृष्टीने विश्वकर्मा लेणे सरस आहे.
 
 क्रमांक ११ 
        हे लेणे `दोन ताल' या नावानेही प्रसिद्ध आहे. या शेजारचे लेणे तिमजली असल्याने त्याला `तीन ताल' असे संबोधले जाते. ही दोन्ही लेणी येथील बौद्ध लेण्यांची अखेर दाखवतात. दो ताल लेण्यातील सर्वांत खालचा मजला १८७६ पर्यंत मातीने भरून गेल्याने त्याचे अस्तित्व कळत नसे. भिक्षुगृहे आणि बुद्धप्रतिमायुक्त गर्भगृह यांमुळे या लेण्याचे स्वरूप मंदिर आणि विहार असे दुहेरी राहिलेले आहे.
दोन तालचे मुखदर्शन
 
      लेण्याच्या दर्शनी भागात आठ खांब कोरलेले असून त्यांच्या मागे अरुंद ओवरी आहे. या ओवरीच्या पाठीमागील भिंतीत पाच लेणी कोरलेली आहेत. पहिले लेणे अपूर्ण, तर दुसऱ्या बुद्धप्रतिमा आहे. ही मूर्ती भव्य असून ध्यानासनात आणि भूमिस्पर्शमुद्रेत आहे. मूर्तीचे आसन गण सावरून धरीत असून जवळच बुद्धाला पायस देणाऱ्या सुजातेचे शिल्प आहे. नेहमीप्रमाणे दोन्ही बाजूंस अवलोकितेश्वर आणि वज्रपाणी हे बोधिसत्त्व आहेत. गाभाऱ्याच्या बाजूच्या भिंतीत अनेक बोधिसत्त्वांच्या मूर्ती कोरलेल्या असून, त्यांत मैत्रेय (हातात फूल आणि मुकुटात स्तूप), स्थिरचक्र (हातात तलवार), मंजुश्री (कमळ आणि पुस्तक) व ज्ञानकेतू (ध्वज) या स्पष्टपणे ओळखता येतात. याशिवाय जंभाल (कुबेर) आणि तारा (हातात कमळ) यांचीही शिल्पे येथे आहेत. जंभालमूर्तीच्या डाव्या हातात धनाची थैली आहे आणि खाली एक व्यक्ती नाण्यांनी भरलेला कलश घेऊन उभी आहे. या मजल्याच्या मध्यभागी असलेल्या सभामंडपाच्या मागील भागाऱ्यात भूमिस्पर्शमुद्रेतील ध्यानस्थ बुद्धमूर्ती आहे.
 या लेण्याचे वैशिष्ट्य असे की, मंडपाच्या उजव्या आणि समोरच्या भिंतींवर हिंदू देवदेवतांच्या - महिषासुरमर्दिनी, गणेश, काल-प्रतिमा कोरल्या आहेत. बौद्ध धर्माचा प्रभाव नष्ट झाल्याच्या काळातील त्या असाव्यात हे स्पष्ट होते.
    दोन ताल म्हणून ओळखली जाणारी हे लेणे प्रत्यक्षात तीन मजली आहे. लेण्यात वरपर्यंत जाण्यासाठी दगडात घडवलेल्या पायऱ्या आहेत. पहिल्या मजल्यात विशेष दखल घेण्याजोगे शिल्पकाम नाही, मात्र मजल्याच्या मध्यभागी असणार्याल गर्भगृहात चौकोनी आसनावर भगवान बुद्धाची पद्मासनात योगमुद्रेत बसलेली प्रतिमा आहे. दुसऱ्या मजल्यावर चार गर्भगृहे आहेत. पहिल्या गर्भगृहात असणाऱ्या बुद्धाच्या उजवा हात भूस्पर्श मुद्रेत असून डावा हात योगमुद्रेत मांडीवर ठेवलेला आहे. दुसऱ्या क्रमांकाचे गर्भगृह  आकाराने छोटे आहे. यातही बुद्धप्रतिमा आहे. तिसरे गर्भगृह वरच्यापेक्षा खाली असल्यामुळे दोन तीन पायऱ्या उतरून खाली जावे लागते. चौथ्या गर्भगृहात व्याख्यान मुद्रेत बसलेल्या बुद्धाची प्रतिमा आहे. तिसरा मजला म्हणजे खूप मोठा प्रशस्त विहार आहे. विहारामध्ये ठिकठिकाणी खोदकाम सुरू केल्याच्या खुणा आहेत पण ते अर्धवट अवस्थेत सोडलेले आहे.

मानुषी बुद्ध म्हणजे मनुष्यजन्माच्या प्रत्येक कल्पामध्ये बुद्धावस्था प्राप्त झालेले. थोडक्यात बुद्धावतार. हीनयान व महायान पंथ २४ बुद्धावतार मानतात. पैकी महायान शेवटच्या सात अवतारांना मानुषी बुद्ध असे नाव देतात. शेवटचा आठवा मानुषी बुद्ध हा 'मैत्रेय' हा भविष्यातील बुद्ध आहे जसे हिंदू 'कल्की' यास भविष्यातील विष्णू अवतार मानतात.

हे सात मानुषी बुद्ध पुढीलप्रमाणे. यातील प्रत्येकास त्यांचा स्वतंत्र बोधीवृक्ष आहे.
१. विपश्यी
२. शिखी
३. विश्वभू
४. क्रकुच्छन्द
५. कनकमुनी
६. काश्यप
७. शाक्यमुनी

यातील सातव्या शाक्यमुनीलाच गौतम बुद्ध असेही मानले जाते.

a

 गर्भगृहातील भूमीस्पर्श मुद्रेतील बुद्धप्रतिमा. बुद्धाने मारविजयानंतर भूमीला स्पर्श करून तिचे आवाहन केलेयाचे हे प्रतिक.
a

दुसर्‍या मजल्याची रचना
a

ओसरीतील स्तंभांवरील वाळूच्या घड्याळ्यासारखी दिसणारे नकसकाम
a

आतील भिंतींवरील बोधीसत्वाच्या मूर्ती असलेल्या चित्रचौकटी
a

तिसर्‍या मजल्यावरून दिसणारे प्रांगण

क्रमांक १२ : 
   दो ताल लेण्याच्या शेजारी `तीन ताल’ या नावाने ओळखले जाणारे हे तीन मजली लेणे आहे.  तीन मजल्यांच्या रचनेमुळे ह्या लेणीला तीन ताल असे म्हटले गेले. सुरुवातीच्या काही पायर्‍या मग खडकातच खोदून काढलेले प्रवेशद्वार, त्यापुढे विस्तीर्ण प्रांगण आणि समोर तीन भव्य मजले अशी ह्याची रचना. हे तीन मजले तरी कसे तर आजचे हॉस्टेल कसे असेल तसेच. जणू जुन्या काळची वसतीगृहेच ही. पण रचना जरी अशी असली तरी येथे विश्रांतीकक्ष फारसे नाहीत. मात्र प्रत्येक मजल्यावर गाभार्‍यासदृश कक्ष आणि त्यात बुद्धमूर्ती अशी ह्याची रचना आहे. साहजिकच वर्षावास म्हणून ह्यांचा वापर फार कमी होत असावा व ही बुद्ध प्रार्थनेची केंद्रे असावीत हे सहजी लक्षात येते.


 

 
 a
 
 a
  तीन ताल चे प्रथम दर्शन
 
साधे स्तंभ पण लेण्यात शिल्पाकृतींची रेलचेल हे या लेण्याचे वैशिष्ट्य. याची भव्यता स्तिमित करते. महायान पंथीय बौद्धांची ही शेवटची निर्मिती समजली जाते. लेण्याच्या समोर एक प्रशस्त अंगण आहे. तिन्ही मजल्यांत आठ-आठ उत्कीर्ण स्तंभांच्या रांगा असून बहुतांशी सर्व खांब चौकोनी ताशीव आहेत. 
तीन ताल लेण्याचा तळमजल्याचा तलविन्यास
a
 सभामंडपाची रचना
 
साध्या घटकांतून भव्यतेची छाप पाडली जाते. तळमजला रुंद आहे. त्यातील दोन दर्शनी स्तंभ पूर्णघट-चिन्हयुक्त असून उर्वरित सर्व साधे व चौकोनी आहेत. या  मजल्यावर भिक्षूंसाठी नऊ खोल्या आहेत. येथील अंतराल लक्षणीय आहे. त्याच्या  उजव्या बाजूच्या मागच्या भिंतीत नऊ मूर्तींचा शिल्पपट आहे. मध्यभागी बुद्धप्रतिमा, उजव्या बाजूस पद्मपाणी अवलोकितेश्वर, डाव्या बाजूस वज्रपाणी,  त्यांच्या वर तीन मूर्ती. डावीकडील मागच्या भिंतीवर अवलोकितेश्वर आणि मंजुश्रीसमवेत बुद्ध कोरलेला आहे.
a
बोधीसत्व मंडले

     अंतराळाच्या मागे गर्भगृहात ध्यानस्थ बुद्धाची भव्य प्रतिमा असून भिंतीवर मैत्रेय, मंजुश्री, स्थिरचक्र आणि ज्ञानकेतू या चार बोधिसत्त्वांची शिल्पे आहेत. मंदिराच्या प्रवेशद्वाराच्या डाव्या बाजूस बुद्ध, ध्यानस्थ तारा, तर उजव्या बाजूस चुंडा या स्त्रीबोधिसत्त्व मूर्ती आहेत. वरच्या मजल्याच्या वाटेत भूमिस्पर्शमुद्रेत बुद्ध आहे. याशिवाय उजव्या भिंतीवर जंभाल (कुबेर), अवलोकितेश्वर आणि तारा यांच्या मूर्ती असून, डाव्या भिंतीवर नऊ मूर्तींचा मंडलपट आहे. सर्वांत वरच्या मजल्याचे वैशिष्ट्य म्हणजे शिल्पांची रेलचेल आणि स्थापत्यातील योजनाबद्ध रेखीवपणा. भिंतीवर बुद्धप्रतिमा कोरलेल्या असून  काही ध्यानमुद्रेत, तर काही धर्मचक्रप्रवर्तनमुद्रेत दाखविल्या आहेत.
Buddhas, ? story Cave 12, c. early 8th century, Ellora (photo: Vikas Singh, CC BY-SA 4.0)

         मुख्य मंदिराच्या दोन्ही बाजूंस, प्रत्येकी सात यांप्रमाणे चौदा बुद्धमूर्तींची रांग कोरलेली आहे. या सात बुद्धमूर्ती ध्यानमुद्रेत असून, त्यांच्या मस्तकांच्या वर निरनिराळ्या वृक्षशाखा कोरलेल्या आहेत. मुख्य मंदिराच्या दाराच्या दोन्ही बाजूंस द्वारपाल आहेत. मंदिरात 3.35 मी. उंचीची  भूमिस्पर्शमुद्रेतील बुद्धाची मूर्ती असून बुद्धाच्या मूर्तीभोवती प्रदक्षिणापथ आहे. मूर्तीवर चुन्याच्या गिलाव्याचे अवशेष आढळतात, त्यावरून ही मूर्ती रंगविली जात असावी. छतावरही रंगकामाचे अवशेष आहेत. या रंगकामाचा काळ नववे शतक असा मानला जातो.
     परंपरागत गवाक्षापासून वेगळेपण, आखणीतील भव्य परिमाणे, अनेक मजल्यांची खोदकामे आणि शिल्पांची रेलचेल ही वेरुळच्या बौद्ध लेण्यांची ठळक वैशिष्ट्ये सांगता येतील. लेण्याच्या प्रवेशद्वाराजवळ दोन बाजूला दोन सिंहप्रतिमा आहेत. आत समोरच चौकोनी प्रशस्त  प्रांगण आहे. व्हरांड्यातील स्तंभांची रचना चौकोनी आहे. या लेण्याचा पहिला  मजला अनेक स्तंभांनी आधारलेला आहे.या मजल्यावर असलेल्या खोल्यांमध्ये दगडी  चौथरे व त्यावर डोके टेकण्यासाठी दगडी उशा खोदलेल्या आहेत. या लेण्यात  मागच्या बाजूला गर्भगृह आहे. या गर्भगृहाच्या प्रवेशद्वाराच्या उजव्या बाजूला बोधिसत्व कोरलेला आहे. त्याच्या डाव्या हातातील कमलपुष्पावर पुस्तक ठेवलेले आहे. गर्भगृहात आत सिंहासनावर धम्मचक्र परिवर्तन मुद्रेतील बुद्धप्रतिमा आहे. 
तीन ताल लेण्याच्या दुसर्‍या मजल्याचा नकाशा 

दुसर्‍या मजल्यावर जाण्यास सभामंडपाच्या डावीकडच्या भिंतीतच सोपानमार्ग खोदला आहे. दुसर्‍या मजल्याची रचनासुद्धा पहिल्या मजल्यासारखीच पण इथे असलेली शिल्पे जास्त सुस्पष्ट आणि देखणी आहेत.

इथेही भिंतींवर पहिल्या मजल्यासारखीच बोधीसत्व प्रतिमा असलेली मंडळे आहेत.
a

उजव्या कोपर्‍यातील भिंतीवर रक्त अवलोकितेश्वर आणि त्याच्यासह स्त्री प्रतिमा अर्थात बोधीशक्ती आसनस्थ असून सर्वांनी हाती कमळे धारण केली आहेत.डावीकडील भिंतीवर रक्त अवलोकितेश्वर, डावीकडे स्त्री बोधीसत्व तारा वरदमुद्रेत आणि भ्रुकुटी पाण्याचा कुंभ घेऊन स्थापित आहेत.
a

 रक्त अवलोकितेश्वर, तारा आणि भ्रूकुटी

 रक्त अवलोकितेश्वर, तारा आणि भ्रूकुटी यांच्या बद्धल अधिक माहिती अशी. अवलोकितेश्वर हा बोधीसत्वांमध्ये सर्वात प्रसिद्ध. याचे प्रमुख लक्षण म्हणजे ह्याच्या हाती कमळ असते. अथांग करुणा हा ह्याचा मुख्य गुणधर्म. हा स्वतःच्या निर्वाणाचा त्याग करून सर्वांच्या सुखाकरिता झटत असतो.

अवलोकितेश्वरामध्ये सर्वच बुद्ध समाविष्ट होतात असे मानले जाते. तारा ही अवलोकितेश्वराची शक्ती किंवा स्त्री बोधीसत्व. तर भ्रूकुटी हे तारेचेच दुसरे रूप.अवलोकितेश्वर आणि तारा ह्यांचे रंगांनुसार वेगवेगळे प्रकार आहेत. रक्त अवलोकितेश्वर हा लाल रंगात दाखवतात. वेरूळमधल्या ह्या मूर्टी तांबड्या रंगात रंगवलेल्या आढळून येतात म्हणून हे रक्त अवलोकितेश्वर आणि त्याची शक्ती रक्त तारा.

बाजूच्या भिंतींवर अशीच लहानमोठी शिल्पे असून समोर गर्भगृह आहे. द्वारपट्टीकेच्या एका बाजूला पद्मपाणी तर दुसरे बाजूस वज्रपाणी बोधीसत्व आहेत.

 a

 a

बोधीसत्व पद्मपाणी आणि वज्रपाणी

      डावीकडच्या भिंतीतूनच तिसर्‍या मजल्यावर जायचा मार्ग आहे. येथेच भिंतीत एक दुमिळ शिल्पे आहे. ह्यात गौतमाने सत्य शोधण्यासाठी आपल्या राज्याचा त्याग केल्याचे दर्शवले आहे. ह्यात गौतम आपल्या घोड्यावर बसून आपले राज्य सोडून पुढे चालला आहे.
a

महान प्रवास


   तिसरा मजला अवश्य पाहावाच असा. येथील भिंतींवरील शिल्पपटात बोधीसत्वांच्या भूमीस्पर्श, धम्मचक्रपरिवर्तन अशा विविध मुद्रेतील देखणी शिल्पे आहेत. तर मंडपाच्या समोरील बाजूस डावीकडे सात मानुषी बुद्ध तर उजवे बाजूस धम्मचक्रपरिवर्तन मुद्रेत बसलेले सात बोधीसत्व आहेत. बुद्ध असलेले दोन अतिभव्य असे शिल्पपट आहेत. ह्या शिल्पपटाचंच्या आतील बाजूस म्हणजेच गाभार्‍याच्या दोन्ही बाजूना तीन तीन बौद्ध देवतांच्या स्त्री प्रतिमा (बोधीशक्ती) कोरलेल्या असून द्वारपट्टीकेच्या दोन्ही बाजूंस दोन्ही हाताची घडी घातलेले बोधीसत्व द्वारपाल आहेत. कलचुरी शैलीचा मोठा प्रभाव ह्या हाताची घडी घातलेल्या द्वारपालांवर जाणवतो.
 
बोधीसत्व पद्मपाणी आणि वज्रपाणी

a


 तिसरा मजला
a

तिसर्‍या मजल्याची साधारण रचना व त्यात असलेले शिल्पपट
a

धम्मचक्रपरिवर्तन मुद्रा
a

ध्यानमुद्रेत बसलेले सात मानुषी बुद्ध
a

धम्मचक्रपरीवर्तन मुद्रेत असणारे सात बोधीसत्व
a

गर्भगृहाच्या डाव्या बाजूस असलेल्या तीन स्बोधीशक्ती प्रतिमा
a

गर्भगृहाच्या उजव्या बाजूस असलेल्या तीन बोधीशक्ती प्रतिमा
a

हाताची घडी घातलेला बोधीसत्व द्वारपाल

वेरूळः भाग १ (जैन लेणी)
 
वेरूळची जैन लेणी सर्वात शेवटी खोदली गेली. साधारण इ.स. नवव्या-दहाव्या शतकात. राष्ट्रकूट राजा अमोघवर्ष याच्या कारकिर्दीत हे लेणी निर्माण केली गेली. अमोघवर्षाची राणी बहुधा जैन घराण्यातील असावी. महाराष्ट्रात जैन लेणी अगदी कमी आढळतात याचे कारण म्हणजे जैनांच्या उपासना पद्धतीत संघप्रार्थनेची योजना नाही. जैनांच्या स्थापत्यशैलीचे असे खास वैशिष्ट्यपण नाही. जैन लेणी बरीचशी बौद्ध आणि ब्राह्मणी लेण्यांप्रमाणेच दिसतात. या लेण्यांतील छोटा कैलास शिल्पाकृती म्हणजे हिंदू कैलासाची छोटी प्रतिकृतीच वाटते. या लेण्या एक मजलीच असून त्याची आतून जोडणी करण्यात आली आहे. विशाल आकाराचा हत्ती आणि कलापूर्ण स्तंभासह सूक्ष्म कलाकुसर, आकर्षक तोरणे हे जैनांचे वैभव साक्षीदार ठरलेत.. २३ वे र्तीथकार पाश्र्वनाथांची विशाल मूर्ती हे येथील वैशिष्टय़ आहे. याशिवाय इंद्र, गोमटेश्वर यांची शिल्पेही येथे पाहावयास मिळतात.जैन लेण्यांत सर्वसाधारणपणे महावीर, पार्श्वनाथ, गोमटेश्वर आणि यक्ष यांच्या प्रतिमा कोरलेल्या आढळतात,
संख्येने कमी असलेली एकूण पाच (क्र. ३० ते ३४ ही जैन धर्मीयांची गुहा-मंदिरे येथे आहेत. त्यात इंद्रसभा, छोटा कैलास आणि जगन्नाथ सभा पाहावयास मिळतात. वेरूळची सर्वच जैन लेणी ही एकमेकांना लागूनच आहेत नव्हे तर वेगवेगळी नसून एकच आहेत. बाहेरून जरी प्रत्येकात शिरायचे मार्ग भिन्न दिसत असले तरी प्रत्यक्षात ही सर्वच लेणी आतून जोडलेली आहेत. त्यामुळे ३५ क्रमांकाच्या लेण्यात जाऊन आणि ३० व्या क्रमांकाच्या लेणीतून बाहेर येऊ शकतो. वेरूळाच्या जैन लेणीचे वैशिष्ट्य म्हणजे इथल्या भिंतींवर, छतावर महावीरांच्या आयुष्यावर आधारीत रंगीत चित्रे काढलेली आहेत. किंचित अजिंठ्याच्या शैलीतलीच ही चित्रे आहेत. या लेणीनंतर ही उत्तरकालीन अजिंठा चित्रशैली नामशेष झाली.जैन लेणी ही थोडी लांबवर असल्याने गाडी घेऊन जाणेच सोयीस्कर ठरते. अर्थात इथे जाण्यासाठी आपले खाजगी वाहन वापरण्याची परवानगी नाही.यासाठी असलेली सरकारी वाहनातूनच आपल्याला जावे लागते.या भागात असलेल्या उन्हाचा विचार करता वाहनातून थेट जैन लेणी बघायला गेलेले चांगले.
क्रमांक ३० : 
क्रमांक ३० चे लेणे म्हणजेच मिनी कैलास अथवा छोटा कैलास. हे कैलासप्रमाणेच द्राविड धर्तीचे मंदिर आहे.एकाच कातळात कोरलेले लहानसे मंदिर आणि त्याच्या आजूबाजूला नक्षीदार उपमंडप अशी याची रचना. हे लेणेसुद्धा आधी कळस मग पाया अशा पद्धतीने खोदले गेले आहे. स्तंभमुखी व्हरांडा, चार स्तंभावर पेललेला मंडप आणि मंडपामागे गर्भगृह असा याचा तलविन्यास आहे. या मंदीरापलीकडे अजून एक मंदीर आणि त्याच्या पलिकडे अजून एक अशी तीन मंदीरे आहेत.हि तिन्ही मंदीरे प्रांगणाच्या डाव्या बाजुला आहेत.प्रांगणाच्या उजव्या बाजुला मंदीर नाही,मात्र प्रांगणातील सर्वात आकर्षक वास्तु म्हणजे सर्वतोभद्र जीन मुर्ती असलेली मंदीराची प्रतिकृती. हि सर्वतोभद्र प्रतिमा हा नव्याने आलेला घटक आहे. ह्या लेणीतील मंदिरात सभामंडप, गर्भगृह आणि वर दक्षिणी पद्धतीची शिखररचना आहे. या लेण्याचा आकार आहे (३९·६२ X २४·३८ मी.)
मंदीराच्या शिखराचे कैलास लेण्यच्या शिखराशी साम्य आहे. हे शिखर पायर्‍या,पायर्‍याचे आणि शंखाकार असुन माथ्याशी निमुळते आहे. शिखराच्या प्रत्येक मजल्याच्या कोपर्‍यात कूट शिखरे असून मधोमध कुट प्रयोजने आहेत. गाभाऱ्यात महावीरांची मूर्ती आहे. हे मंदिर कमालीचे सुंदर आणि नक्षीदार आहे. इथेही बौद्ध लेण्यांप्रमाणेच पिंपळाकार कमानी दिसतात. पण बौद्ध लेण्यांच्या कलेकडून जैन लेण्यांच्या कलेकडे स्थित्यंतर होताना काळाच्या प्रवाहात मूळचे कमानदार निमुळते आकार डेरेदार झालेले दिसतात तर स्तंभांवरील नक्षीकाम देखणे झालेले दिसते तसेच विश्रांतीकक्ष दिसून येत नाहीत. लेणीतच उजव्या बाजूला एक कैलाश लेणीप्रमाणेच एक भव स्तंभ असून त्यावर चतुर्मुखी ब्रह्मयक्षाची प्रतिमा कोरलेली आहे. ८.२६ मीटर उंचीच्या एकाश्म स्तंभ उत्तर राष्ट्रकुट शैलीचे वैशिष्ट्य म्हणावे लागेल. मंदीराच्या समोर असे स्तंभ उभारण्याची पध्दत नंतरच्या काळात दक्षिण भारतात मोठ्या प्रमाणात प्रचलित झाली. डाव्या बाजूला एकाच पाषाणात घडवलेली हत्तीची सुस्थितीतील मूर्ती आहे. हा हत्ती कैलास लेण्याची आठवण करुन देतो.
  मंदिराच्या सभोवतालच्या भिंती ह्या इंद्रसभेच्या बाहेरच्या बाजूस असणाऱ्या अशा आहेत. भिंतींवर महावीर, पार्श्वनाथ यांच्या जीवनातले अनेक प्रसंग कोरलेले आहेत. गोपुराच्या उजव्या आणि डाव्या भिंतींवर शिल्पे आहेत. डावीकडे प्रथम तीर्थंकर ऋषभनाथ यांची यक्षिणी चक्रेश्वरी असून तिचे वाहन गरुड आहे आणि तिने पद्म, चक्र, शंख, गदा व खड्‌ग ही आयुधे धारण केली आहेत. उजवीकडे समभंगातील तीर्थंकरांच्या तीन मूर्ती आहेत. लेण्यात अग्रमंडप, मुख्य मंडप व गर्भगृह हे वास्तुघटक आहेत. अग्रमंडपाच्या पाठीमागील भिंतीवर सौधर्मेंद्र यक्षाच्या दोन नृत्यमूर्ती आहेत. सभामंडपाच्या भिंतीवर गंधर्वमिथुने कोरलेली आहेत. याच्या दरवाजाच्या बाजूवर शंखनिधी आणि पद्मनिधी आहेत. गर्भगृहात महावीर यांची मुख्य मूर्ती असून बाजूला इतर तीर्थंकरांच्या प्रतिमा आहेत. त्यांत पार्श्वनाथ, गोमटेश्वर यांच्या मूर्ती लक्षणीय आहेत. परंतु उत्तरेकडील भिंतीत योगासनातील अष्टभुजा देवीची मूर्ती आहे. तिने उजव्या तीन हातांत अनुक्रमे त्रिशूळ, पाश, खड्‌ग धारण केले असून चौथा हात वरदमुद्रेत आहे. डाव्या हातांत पाश, घंटा असून एक हात अभयमुद्रेत आहे. अग्रमंडपात गदाधारी द्वारपाल असून छतावर भित्तिचित्रांचे अवशेष आढळतात. पार्श्वनाथ हे तेवीसावे तीर्थंकर. यांची तपस्या भंग करण्यासाठी कमठ या राक्षसाने हरतऱ्हेने प्रयत्न केले. त्यावेळी धरणेंद्र यक्ष आणि त्याची पद्मावती यांनी पार्श्वनाथांचे संरक्षण केले. धरणेंद्राने आपला सप्तफणा पार्श्वनाथांच्या मस्तकी धारण केला आहे आणि आपल्या शरीराच्या वेटोळ्यांनी त्यांच्या शरीराचे कमठापासून संरक्षण केले आहे. बुद्ध, बुद्धशत्रू मार आणि बुद्धाचे नागराज अनुयायी नंद आणि अनुपनंद यांच्यासारखीच ही कथा. अजूनही कित्येक प्रसंग ह्या लेणीच्या भिंतींवर कोरलेले आहेत. इथले मूर्तीकाम अतिशय सुरेख आहे. ह्या लेणीचा अंर्तभाग हाच इंद्रसभेचा बाह्यभाग आहे.
अजूनही कित्येक प्रसंग ह्या लेणीच्या भिंतींवर कोरलेले आहेत पण त्यामागच्या कथा समजत नाहीत पण इथले मूर्तीकाम अतिशय सुरेख आहे. ह्या लेणीचा अंर्तभाग हाच इंद्रसभेचा बाह्यभाग आहे. किंबहुना ही पाचही लेणी इतकी अभिन्न आहेत की यांचे वर्णन लिहितांना यांचा वेगळा विचार करून लिहिणे अशक्यच आहे.वास्तविक हे लेणीसंकुल म्हणजे वेगवेगळ्या लेणी नसून एकाच लेणीचे हे वेगवेगळे विभाग आहेत असेच समजावे.

jain temples ellora caves chhota kailasa

छोटा कैलासचा एरियल व्ह्यु
jain temples ellora caves chhota kailasa


a 

 इंद्रसभेतून दिसणारे छोटा कैलास
a 

छोटा कैलासचे संपूर्ण दर्शन

Jain Chhota Kailasa (Cave 30), ca. early 9th century, Ellora (Photo: Lisa N. Owen)

इथेही बौद्ध लेण्यांप्रमाणेच पिंपळाकार कमानी दिसतात. पण बौद्ध लेण्यांच्या कलेकडून जैन लेण्यांच्या कलेकडे स्थित्यंतर होताना काळाच्या प्रवाहात मूळचे कमानदार निमुळते आकार डेरेदार झालेले दिसतात तर स्तंभांवरील नक्षीकाम देखणे झालेले दिसते तसेच विश्रांतीकक्ष दिसून येत नाहीत.
a

लेणी क्र. ३१ वरून दिसून येत असलेली तीमजली रचना
a

कमानींची बदललेली रचना आणि तीर्थकरांचे प्रसंग
a

गोमटेश्वर, मातंग यक्ष, सिद्धायिका आणि महावीरांच्या मूर्ती कोरलेला शिल्पपट
a

 गज आणि व्याल प्रतिमा

पार्श्वनाथ हे तेवीसावे तीर्थंकर. यांची तपस्या भंग करण्यासाठी कमठ या राक्षसाने हरतर्‍हेचे प्रयत्न केले. त्यावेळी धरणेंद्र यक्ष आणि त्याची पद्मावती यांनी पार्श्वनाथांचे संरक्षण केले. धरणेंद्राने आपला सप्तफणा पार्श्वनाथांच्या मस्तकी धारण केला आहे आणि आपल्या शरीराच्या वेटोळ्यांनी त्यांच्या शरीराचे कमठापासून संरक्षण केले आहे.बुद्ध, बुद्धशत्रू मार आणि बुद्धाचे नागराज अनुयायी नंद आणि अनुपनंद यांच्यासारखीच ही कथा.
a

पार्श्वनाथ आणि कमठाची कथा
a 

महावीर मंदिराच्या बाहेर असलेला स्तंभ (ओबेलिस्क) आणि त्यावरील चतुर्मुखी ब्रह्मयक्ष
a

मंदिर कळस आणि स्तंभ
a 

 सुस्थितीत असलेली गजप्रतिमा
a

या पुढे एक साधेसे लेणे असून आतमध्ये स्तंभ आणि महावीराच्या प्रतिमेशिवाय काहीही नाही.
a

ह्या संपूर्ण लेणीसमूहाचा बाह्यभाग
a 

 डावीकडची जगन्नाथसभा, मधली कातळाआड दडलेली इंद्रसभा आणि उजवीकडे छोटा कैलास.

छोटा कैलास लेण्यावर हिंदु लेणे मंदीर कैलास लेण्याचा प्रभाव आहे.थोडे निरीक्षण केले तर आपल्याला या दोन्ही लेण्यातील साम्य दिसून येते. 

 
 स्तंभावरील नक्षीकाम हे दोन्ही लेण्यात सारखेच आहे.
 
 लेण्याचा मुखमंडप किंवा अधिष्ठाण हे थेट कैलास लेण्यासारखेच आहे.इथेही आपल्याला गजथर बघायला मिळतो. 
 
कैलास लेण्यासारखीच आपल्याला इथेही छतावर कमलबंध किंवा कमळशिल्प दिसतात.
हिंदु लेण्याप्रमाणे जैन लेण्यासमोर असलेल्या स्तंभावर असलेले चौमुख
jain temples ellora caves stone carvings

या लेण्याजवळ एक अपूर्ण लेणे आहे. लेणी क्रमांक ३० च्या उजवीकडच्या बाजुने मागील टेकडीवर चढून गेलो तर एक सुंदर शिल्पकला असलेले जैन मंदीर बघायल मिळते. सहसा पर्यटक इकडे फारसे फिरकत नाहीत, पण आवर्जून बघावे असे हे ठिकाण. अर्थात याला कारण म्हणजे जमीनीच्या पातळीपासून हे जैन मंदीर सहजासहजी दिसत नाही. हे  एक अपूर्ण लेणे आहे. या लेण्यात चतुर्मुख तीर्थंकर, छतावरील कमलपुष्प, पूर्णघट कोरलेले स्तंभ, अग्रमंडपातील कक्षासन आणि जोत्यावरील हत्ती अशी मोजकी शिल्पे आढळतात.

क्रमांक ३१ : क्रमांक ३१ ते ३४ ही लेणी एकमेकांस लागून खोदलेली आहेत. पहिल्या लेण्याच्या दर्शनी भागात चार खांब आहेत. सभामंडपात गोमटेश्वराची कार्योत्सर्गमुद्रेत उभी मूर्ती असून तिच्या समोर पार्श्वनाथ तीर्थंकराची प्रतिमा आहे. गर्भगृहात महावीराची ध्यानमुद्रेतील प्रतिमा असून वर पुष्पमाला घेतलेले गंधर्व विहार करीत आहेत. गर्भगृहाच्या बाहेर डाव्या बाजूस वटवृक्षाखाली असलेली मातंगाची, तर उजव्या बाजूला आम्रवृक्षाखाली सिंहासनारूढ सिद्धायिकेची मूर्ती कोरली आहे. जैन परंपरेप्रमाणे महावीर तीर्थंकराशी मातंग यक्ष म्हणून, तर सिद्धायिका शासनदेवता म्हणून निगडित आहेत.

क्रमांक ३२ :

 हे इंद्रसभा नावाने प्रसिद्ध आहे. त्याच्या प्रांगणात मधोमध एका उंच चौथऱ्यावर तीर्थंकराचे सर्वतोभद्र प्रतिमागृह आहे. या प्रतिमागृहाला चारही बाजूंस दोन खांब असलेले अग्रमंडप आहेत. मंदिरावर द्राविड पद्धतीचे शिखर आहे. मंदिरनिर्मितीचे तंत्र कैलासाप्रमाणेच म्हणजे वरून खाली आहे. प्रांगणाच्या तिन्ही बाजूंस दुमजली लेणी कोरलेली आहेत. या लेण्यांच्या कक्षासनांवर कैलासाशी साम्य दर्शविणारी गजमुखे कोरलेली आहेत. प्रांगणाच्या दक्षिण आणि उत्तरेकडील भिंतींत पार्श्वनाथ, गोमटेश्वर, सिद्धायिका, मातंग यक्ष आणि इतर काही तीर्थंकर यांची शिल्पे आहेत.
मुख्य लेण्यात गेल्यावर अग्रमंडपात एक महत्त्वाचा पुरावा दिसून येतो. एका खांबावर तांबड्या गेरूने तीर्थंकर प्रतिमेचे रेखाटन केल्याचे दिसते. त्यानुसार मूर्ती घडविली जाई, असे स्पष्ट होते. याच मंडपातील दुसऱ्या एका खांबावर तीर्थंकार प्रतिमेखाली `नागवर्मकृत प्रतिमा’ असा उत्कीर्ण लेख असून, दुसऱ्या एका खांबावर `श्री सोहिलब्रह्मचारिणी शांतिभट्टारक प्रतिमेयम्‌’ असा लेख शांतिनाथ तीर्थंकराच्या प्रतिमेखाली आहे. देवनागरीतील हा शिलालेख यादवकाळातील असावा. राष्ट्रकूटांच्या अस्तानंतर येथे यादवांचे साम्राज्य आले व तेव्हाही ह्या जैन लेणीत मूर्ती कोरणे सुरुच होते. श्री सोहिल ब्रह्मचारिणा शांति भट्टारक प्रतिमेयम - म्हणजे सोहिल नामक ब्रह्मचार्यासने शांतिनाथ तीर्थकरांची ही मूर्ती कोरली आहे. 
 
इंद्रसभेच्या खालच्या मजल्याचा नकाशा

याच लेण्याच्या तळमजल्याच्या गर्भगृहात महावीराची मूर्ती आहे. हि मुर्ती व्हरांडा आणि मंडप यांना अलग करणारे कडेचे दोन अर्धस्तंभ आणि मधले दोन स्तंभ यांनी बनवलेलया ओळीत आहेत.याच ओळीतील दुसर्‍या अर्धस्तंभावर अशीच मुर्ती आहे.इंद्रसभेच्या वरच्या मजल्यावरील लेणीसंकुल अधीक प्रेक्षणीय आहे. व्हरांड्याच्या पुर्व टोकाकडून वर जाण्यासाठी जीने आहेत. दक्षीणाभिमुख असलेले मुख्य गर्भगृह आणि आग्नेय व नैऋत्य कोपर्‍यात एकमेकासमोर असलेली दोन उपगर्भगृह असे या वरच्या लेण्याचे वर्णन करता येईल. मंडपाच्या दोन्ही बाजुच्या भिंतीच्या देवकोष्ठामध्ये परिषहाला सामोरा जाणारा पार्श्वनाथ आणि बाहुबलीचे महात्म्य दाखवणारे कथापर शिल्पपट आहेत.व्हरांड्याच्या बाजुवर अंबिका आणि सर्वानुभुती यक्ष दाखवीला आहे. मुख्य गर्भगृहाचा मंडप बारा स्तंभावर पेलला असून मधोमध सर्वतोभद्र प्रतिमा ठेवण्यासाठी पीठ आहे.
वरच्या मजल्यावर चढताना अर्ध्या वाटेतील प्रतिमागृहात महावीर, पार्श्वनाथ, गोमटेश्वर, सिद्धायिका आणि मातंग यक्ष यांच्या प्रतिमा आहेत तर वरच्या मजल्यावरील अग्रमंडपात मातंग आणि सिद्धायिका यांच्या समोरासमोर भव्य प्रतिमा आहेत.धाराशीव आणि बदामी लेण्यात बसलेले तीर्थंकर आणि खडगासनातील मुनी दाखविण्याचा प्रयत्न केला, त्याचे सर्वोच्च रुप येथील लेण्यात दिसते.Cave 32 (Indra Sabha), c. 9th century (left photo: Jean-Pierre Dalbéra, CC BY 2.0; right photo: Steve Silberman, CC BY-NC-ND 2.0) मंडपाचे खांब घटपल्लव आणि इतर शिल्पे यांनी सुशोभित केले आहेत, छतावर कमळ कोरलेले आहे. मंडपाच्या मागील भिंतीत पार्श्वनाथ, महावीर व गोमटेश्वर यांच्या प्रतिमा आहेत. या मंडपाच्या छतावर चित्रकारीचे पुसट अवशेष दिसतात.

इंद्रसभेच्या वरच्या मजल्याचा नकाशा

वास्तविक जैन धर्मामध्ये इंद्र आदी देवतांचे बरेच उल्लेख आहेत पण ह्या लेण्यामध्ये इंद्राचा तसा काहीही संबंध नाही. येथील गर्भगृहाच्या दाराच्या डावीकडे हत्तीवर बसलेल्या मातंग यक्षाची सुंदर मूर्ती कोरलेली आहे तर दुसऱ्या बाजूला सिद्धायिकेची सुंदर मूर्ती आहे. ह्या दोन मूर्तींकडे पाहूनच ह्यांना इंद्र आणि इंद्राणीच्या मूर्ती समजले गेले आणि लेण्याचे नामकरण इंद्रसभा असे झाले. इंद्राशी काहीही संबंध नसला तरीही ह्या लेणीचे काम अगदी इंद्राच्या राज्यसभेला साजेसे असे कमालीचे देखणे आणि सुबक झालेले आहे. Cave 32 (Indra Sabha), c. 9th century (left photo: Jean-Pierre Dalbéra, CC BY 2.0; right photo: Steve Silberman, CC BY-NC-ND 2.0)

इंद्रसभा हे लेणेसुद्धा जगन्नाथसभेसारखेच दुमजली असून त्याची रचना पण त्यासारखीच आहे. मात्र इंद्रसभेतल्या मूर्तीचे कोरीव काम अतिशय सुबक आहे तर इथल्या स्तंभांवरचे नक्षीकाम कमालीचे नाजूक आहे. इंद्रसभेतील इतर मूर्तीमध्ये पार्श्वनाथ, गोमटेश्वर, महावीर इत्यादी तीर्थकरांच्या सुंदर मूर्ती कोरलेल्या असून स्तंभांवर अतिशय देखणे नक्षीकाम केले आहे. इंद्रसभेचे प्रमुख वैशिष्ट्य म्हणजे इथल्या ओसरीतील मातंग यक्ष आणि सिद्धायिकेच्या प्रतिमा. हत्तीवर मातंग यक्ष एक पाय खाली सोडून बसलेला आहे. मस्तकी मुकूट, गळ्यांत हार, बाजूबंद, कमरपट्टा त्याने परिधान केलेला आहे तर जानव्यासदृश एक हार त्यांच्या खांद्यावरून पोटाच्या बाजूने गेलेला दिसतो आहे. त्याचे वाहन असलेल्या हत्तीच्या मस्तकीही मोत्यांचे दागिने दिसत आहेत तर बाजूलाच दोन सेवक आज्ञापालनासाठी उभे आहेत. यक्षाच्या डोक्यावर वटवृक्षाच्या पर्णसंभाराने छाया धरली असून पानांच्या शिराही अगदी स्पष्टपणे कोरलेल्या आहेत तर त्या वॄक्षाच्या डेऱ्यावर मयुर पक्षी विहरतांना दाखवले आहेत. अशा ह्या सुंदर मूर्तीला इंद्र समजले जाणे यात काहीच नवल नाही. ही अतिसुंदर मूर्ती कोरतांनाही यक्षांची स्थूल तनु, सुटलेले पोट, मोठे डोळे आणि ठेंगणेपणा आदी मूळ वैशिष्ट्ये येथेही कायम ठेवलेली आहेत. ओसरीत एका बाजूला सिद्धायिकेची तितकीच देखणी मूर्ती कोरलेली आहे. सिद्धायिका ही सिंहावर आरूढ असून एक हात तिने आशीर्वादपर मुद्रेत उंचावला असून दुसर्यास हाताने तीचे लहान मूल ती सांभाळत्ये आहे. हिच्याही अंगाखांद्यावर अनेक अलंकार असून बाजूला सेवक हीची आज्ञा झेलण्यासाठी सज्ज आहेत. हिच्या मस्तकी आम्रवृक्षाच्या पर्णसंभार दाखवलेला असून वृक्षाला फळेही लागलेली आहेत. जणू मातृरूपी शक्तीचे हे एक प्रतिकच आहे. वृक्षात मधूनच फळ खायला आलेले एक मर्कट कोरलेले असून वरच्या बाजूला मोर कोरलेले आहेत. सिद्धायिका ही सुद्धा देवी नसून यक्षिणीच मानली जाते. ह्या लेणीतसुद्धा काही चित्रे कोरलेली आहेत. इथली चित्रे बरीचशी खराब झाल्यामुळे तशी अस्पष्टशी आहेत. जगन्नाथसभेच्या वरच्या मजल्यावरून इंद्रसभेच्या वरच्या मजल्यावर आपला प्रवेश होतो व दुसऱ्या बाजूने एका जिन्याने आपण इंद्रसभेच्या तळमजल्यावर येतो.

 

Cave 32, the most spectacular of the Jain complex at Ellora
This statue in Cave 32 depicts either Ambika, the Jain mother goddess, or Siddhayika, a yakshini, or fairy-like creature. She's seated upon a lion beneath a tree heavy with fruit
A jina, or enlightened being, at the back of Cave 32 at Ellora
Monks in bright saffron robes can be seen throughout the Ellora complex, including the stunning second story of Cave 32

 

इंद्रसभेतील इतर मूर्तीमध्ये पार्श्वनाथ, गोमटेश्वर, महावीर इत्यादी तीर्थकरांच्या सुंदर मूर्ती कोरलेल्या असून स्तंभांवर अतिशय देखणे नकसकाम केले आहे.
a

इंद्रसभेचा अंतर्भाग
a

 

स्तंभांवरील सुरेख नक्षीकाम
a

 भिंतीवर कोरलेली मातंग यक्ष प्रतिमा
a सभामंडपातील कोरीव स्तंभ
a 

 गोमटेश्वर
a 

 पार्श्वनाथ

jain temples ellora caves stone carvings
Inside the cave on the second floor
jain temples ellora caves stone carvings
Another mesmerised tourist

 इंद्रसभेचे प्रमुख वैशिष्ट्य म्हणजे इथल्या ओसरीतील मातंग यक्ष आणि सिद्धायिकेच्या प्रतिमा.

हत्तीवर मातंग यक्ष एक पाय खाली सोडून बसलेला आहे. मस्तकी मुकूट, गळ्यांत हार, बाजूबंद, कमरपट्टा त्याने परिधान केलेला आहे तर जानव्यासदृश एक हार त्यांच्या खांद्यावरून पोटाच्या बाजूने गेलेला दिसतो आहे. त्याचे वाहन असलेल्या हत्तीच्या मस्तकीही मोत्यांचे दागिने दिसत आहेत तर बाजूलाच दोन सेवक आज्ञापालनासाठी उभे आहेत. यक्षाच्या डोक्यावर वटवृक्षाच्या पर्णसंभाराने छाया धरली असून पानांच्या शिराही अगदी स्पष्टपणे कोरलेल्या आहेत तर त्या वॄक्षाच्या डेर्‍यावर मयुरादी पक्षी विहरतांना दाखवले आहेत. अशा ह्या सुंदर मूर्तीला इंद्र समजले जाणे यात काहीच नवल नाही. ही अतिसुंदर मूर्ती कोरतांनाही यक्षांची स्थूल तनु, सुटलेले पोट, मोठे डोळे आणि ठेंगणेपणा आदी मूळ वैशिष्ट्ये येथेही कायम ठेवलेली आहेत.
a

मातंग यक्ष प्रतिमा

ओसरीत एका बाजूला सिद्धायिकेची तितकीच देखणी मूर्ती कोरलेली आहे.सिद्धायिका ही सिंहावर आरूढ असून एक हात तिने आशीर्वादपर मुद्रेत उंचावला असून दुसर्‍या हाताने तीचे लहान मूल ती सांभाळत्ये आहे. हिच्याही अंगाखांद्यावर अनेक अलंकार असून बाजूला सेवक हीची आज्ञा झेलण्यासाठी सज्ज आहेत. हिच्या मस्तकी आम्रवृक्षाच्या पर्णसंभार दाखवलेला असून वृक्षाला फळेही लागलेली आहेत. जणू मातृरूपी शक्तीचे हे एक प्रतिकच आहे. वृक्षात मधूनच फळ खायला आलेले एक मर्कट कोरलेले असून वरच्या बाजूला मोर कोरलेले आहेत.सिद्धायिका ही सुद्धा देवी नसून यक्षिणीच मानली जाते.

jain temples ellora caves stone carvings
A beautiful idol at a Jain temple at Ellora


a 

 सिद्धायिका शिल्पप्रतिमा

 

लेणे क्र. ३२ च्या खालच्या मजल्यावर असलेली नागवर्मा आणि सोहीला यांची प्रतिमा. तसेच उजव्या बाजुच्या शिल्पात कैलासनाथ मंदीराचे पुजा करणारे भाविक दाखवले आहेत. 

ह्या लेणीतसुद्धा काही चित्रे कोरलेली आहेत. इथली चित्रे बरीचशी खराब झाल्यामुळे तशी अस्पष्टशी आहेत.
a

प्रवचन ऐकतांना स्त्रीयांची चित्रे
a

 प्रवचन ऐकतांना हात जोडलेले पुरुष
a

छतावर रंगवलेल्या विविध प्रतिमा
a

 अंगावरील दागिने कमालीचे देखणे रंगवलेले आहेत.

इथल्या सज्जावरून लेणी क्र. ३१ अर्थात मिनी कैलासचे अतिशय सुरेख दर्शन होते. किंबहुना इंद्रसभेचा जो बाह्यभाग आहे तोच छोटा कैलासचा अंर्तभाग आहे.

jain temples ellora caves stone carvings

jain temples ellora caves stone carvings

jain temples ellora caves stone carvings


a

इंद्रसभेचा बाह्यभाग
a

सुबक कोरीवकाम

जगन्नाथसभेच्या वरच्या मजल्यावरून इंद्रसभेच्या वरच्या मजल्यावर आपला प्रवेश होतो व दुसर्‍या बाजूने एका जिन्याने आपण इंद्रसभेच्या तळमजल्यावर येतो. तळमजल्यावरही मातंग यक्ष, सिद्धायिका, गोमटेश्वर, पार्श्वनाथ, महावीर आदी मूर्ती कोरलेल्या आहेत.
a

 मातंग यक्ष, सिद्धायिका आणि गर्भगृहातील महावीर
a 

 गोमटेश्वराची गंधर्वांसहित देखणी प्रतिमा

इथल्याच एका भिंतीवर देवनागरीत एक शिलालेख कोरलेला आहे. माझ्यामते हा शिलालेख यादवकाळातील असावा. राष्ट्रकूटांच्या अस्तानंतर येथे यादवांचे साम्राज्य आले व तेव्हाही ह्या जैन लेणीत मूर्ती कोरणे सुरुच होते.

श्रीसोहिल ब्रह्म
चारिणा शान्ति भट्टा
रक प्रतिमेय

श्री सोहिल ब्रह्मचारिणा शांति भट्टारक प्रतिमेयम - म्हणजे सोहिल नामक ब्रह्मचार्‍याने शांतिनाथ तीर्थकरांची ही मूर्ती कोरली आहे
a

शिलालेख

ह्यानंतरची चित्रे बघण्यासाठी आपल्याला थेट जैन लेणीतील इंद्रसभा व जनन्नाथसभा ह्या दोन लेण्यांत जावे लागते. ह्या दोन्ही लेण्यांच्या भव्य मंडपात छतावर व भिंतींवर असंख्य चित्रे आहेत जी बघण्यासाठी विजेरीशिवाय पर्याय नाही.

 a

छतावर रंगवलेले भगवान महावीरांचे ध्यानमुद्रेतील चित्र.
a

 a

दोन स्तंभांदरम्यान असलेले छतावरील रंगकाम
a

भवान महावीरांचे अनुयायांसह असलेले प्रवचनमुद्रेतले चित्र
a

 अतिशय सुरेख समतोल साधला गेलाय ह्या चित्रामध्ये.
a

हे अजून एक नृत्यमुद्रेतील चित्र

a

 येथे सर्व स्त्रिया बसून बहुधा महावीरांच्या प्रवचनाचे श्रवण करत असाव्यात असा त्यांच्या हात जोडलेल्या अवस्थेवरुन तर्क लावता येतो.
a

झूम इन

 a

येथे पुरुषप्रतिमाही तशाच मुद्रेत आहेत.
a

a

हे अक अत्यंत पुसट असे चित्र

 a

हे चित्र थेट अजिंठ्यातील १७ व्या क्रमांकाच्या लेण्यातील ओसरीचे भितीवर रंगवलेल्या वेस्संतर जातकातील चित्राची आठवण करुन देते.
a

नृत्य का ध्यान का दोन्ही?
a

 हे बहुधा घोडे, हरिण दिसत आहेत.
a

महावीरांची ध्यानमुद्रा व त्याखाली भलाथोरला वृक्ष

a

सर्वात उजवीकडे वाघावर स्वार असा कुणीतरी दिसतोय.
a

स्तंभांवरची देखणी नक्षी
a

स्तंभांदरम्यानच्या छतावरची देखणी नक्षी
a

 छतावरील नक्षीचे अवशेष
a

छतावरील नक्षीचे अवशेष
a

गोमटेश्वराचे चित्र. महावीर छातीपर्यंत येणार्‍या जलामध्ये उभे राहून तप करत आहेत. त्यांच्या हातापायांना वेलींनी विळखा घातलेला आहेत तर बाजूला दोन अनुयायी आहेत.

वरील चित्र इंद्रसभेतील मुख्यमंडपाच्या बाहूस असलेल्या उपलेण्यात आहे. ह्या मुख्य मंडपाचे दोन्ही बाजूस अशीच उपलेणी असून त्या तील गाभार्‍यात अत्यंत अंधारात ही चित्रे रंगवलेली आहेत. ही चित्रे शोधणे माहितगाराशिवाय दुरापास्त आहे. संपूर्ण गाभार्‍याच्या तिन्ही बाजूच्या भिंती, छत यांवर ही चित्रे कोरलेली आहेत. गाभार्‍याचे दरवाजाचे आतील दोन्ही बाजूचे भिंतीवर एकीकडे गोमटेश्चर तर दुसरीकडे पार्श्वनाथ आणि इतर बाजूस व छतांवर वेगवेग़ळे प्रसंग तसेच नक्षीकाम. यातील पार्श्वनाथाचे चित्र मजकडून गहाळ झाले. ह्या उपलेण्यांतीलच अजून काही चित्रे आपण पाहूयात.
a

 गोमटेश्वर मुखदर्शन
a

 छतांवरील रंगकाम
a

 हे एक अतिशय देखणे चित्र
a

चित्रपट्टीका
a

फुलाचे देखणे रंगकाम
a

 ही एक देखणी जोडी
a

ही अजून एक चित्रपट्टीका
a

 झूम इन
a

ही अजून एक नृत्यमुद्रा

a

 ह्यांचे दागदागिने अगदी उठून दिसत आहेत.

खाली दिलेले चित्राविषयी थोडा संभ्रम आहे. ह्या चित्रात नर्तिकेला (का नर्तकाला?) आठ हात दाखवलेले असून ती एका लयीत नृत्य करीत आहे. दोनपेक्षा जास्त असलेली चित्रे जैन लेण्यांत बहुधा नाहीतच. डाव्या बाजूचे खालचे बाजूस वादक तबला व डग्गा वाजवत आहेत. तबल्याचे हे बहुधा सर्वात प्राचीन चित्रांकन असावे.
आठ हात जरी असले तरी हे जैन लेणीतील चित्र असल्याने हा नटराज शिव निश्चितच नाही हा तर्क सहजच काढता येतो. मग हे चित्र कोणाचे असावे असा प्रश्न उपस्थित होतो.अंदाजाप्रमाणे हे चित्र बहुधा चक्रेश्वरी यक्षीचे असावे. ८ हात हे तिचे एक लक्षण आहे.
a 

हेच ते चित्र

वेरूळ लेण्यातील या चित्रांवर अलीकडेच संशोधन होउन काही नवीन माहिती समोर आली आहे, त्याविषयी. वेरूळ येथील जगप्रसिद्ध लेणीच्या गिलाव्यात सापडलेल्या गूढ वनस्पतीबाबतच्या संशोधनावर डॉ. मिलिंद सरदेसाई, वनस्पतिशास्त्र विभाग, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ यांनी काम केले.त्यांनी नोंदवलेली निरिक्षणे त्यांच्याच शब्दात .
मी पूर्वी डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात कार्यरत होतो. एक दिवस तेथील तत्कालीन परीक्षा नियंत्रक डॉ. अशोक चव्हाण यांनी दुपारी चारच्या सुमारास मला चहाला येण्यासाठी निरोप दिला. तिथे पोहोचलो, तर त्यांच्या कक्षात आधीपासूनच एक व्यक्ती बसली होती. चहा घेत असताना बसलेल्या व्यक्तीची ओळख करून दिली. ते होते डॉ. मॅनेजर सिंग. ते तेव्हा केंद्र सरकारच्या पुरातत्व विभागात मोठ्या पदावर कार्यरत होते. ते ज्या कामासाठी आले होते, ते आगळेवेगळे होते.
बाराव्या गुहेमधील गिलावा:-
मॅनेजर सिंग हे वेरूळच्या लेण्यांमधील १२ व्या गुहेमधील भित्तीचित्रांच्या गिलाव्याचा एक तुकडा घेऊन आले होते. तो गुहेत खाली पडलेला एक छोटासा नमुना होता. त्यांनी तो छोट्या प्लास्टिकच्या पिशवीतून आणला होता. हा नमुना साधारणतः ५ व्या किंवा ६ व्या शतकातील होता. चहा घेतच त्यांनी ती पिशवी माझ्याकडे दिली. ती जवळून पाहिल्यावर माझ्या लक्षात आले की त्या मातीमध्ये कोणत्या तरी वनस्पतीचे तुकडे आहेत. त्यांनी मला ती वनस्पती ओळखण्याबाबत विचारले. माझ्या मनात प्रश्न आला की ती वनस्पती कोणती आहे ओळखून उपयोग काय? हा प्रश्न मी त्यांना बोलून दाखवला. त्यांनी सांगितले की, एकदा का ही वनस्पती ओळखता आली की तिचा वापर करून वेरूळच्या गुहांमधील भित्तिचित्रांच्या संवर्धनाचे काम करणे सोपे होईल. त्यांनी सांगितलेली बाब महत्वाची होती. जाता जाता त्यांनी एक अटही घातली. ती अशी की त्यांनी मला दिलेल्या नमुन्यांची हाताळणी केवळ मीच करावी.
मी जवळपास गेली दोन दशके वनस्पती वर्गीकरणशास्त्राचा अभ्यास करत आलो होतो. असे असले तरीही मी या आधी अशा प्रकारचा नमुना कधीही अभ्यासला नव्हता. वनस्पती वर्गीकरणशास्त्रानुसार कोणत्याही वनस्पतीची ओळख अचूक होण्यासाठी पाने, फुले आणि शक्यतो फळे असणारी फांदी असावी लागते. तरच ओळख सोपी आणि अचूक होऊ शकते. मी म्हटले की हे थोडसे अवघड काम आहे आणि यासाठी वेळ लागू शकतो.
एका अवघड शोधमोहिमेची सुरुवात
त्यानंतर अनेक महिने मी याच कामावर लागलो होतो. वेरूळ व इतर भागातील भौगोलिक परिस्थिती, तेथील तत्कालीन पीक - पाणी, गुहा कशी खोदली जाते, त्यामध्ये कोरली जाणारी लेणी आणि भित्तिचित्रांची निर्मिती, कोणत्याही बांधकामामध्ये गिलावा करताना त्यामध्ये कोणकोणत्या वनस्पतींचे मिश्रण घातले जात... याबाबतचे अनेक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय संदर्भ मिळतात का, हे शोधण्याच्या मागे लागलो.
#वेरूळ हे एक छोटेसे गाव. ते औरंगाबादच्या उत्तरेला साधारणतः ३० किलोमीटर अंतरावर एलगंगा नदीच्या काठावर वसलेले आहे. एलगंगा नदीवरूनच त्याचे मूळ नाव एलूर, तद्नंतर एल्लापुरा आणि सरतेशेवटी वेरूळ असे झाले. ब्रिटिश राजवटीनंतर ते एलोरा नावानेच जगभर ओळखले जाऊ लागले. तिथे अगदी गावानजिकच असलेल्या डोंगरांमध्ये अनेक मानवनिर्मित गुहा आहेत. सध्या सर्व लेणी केंद्र सरकारच्या पुरातत्व विभागाच्या अखत्यारीत आहेत. त्यातील ४० लेणी पुरातत्व विभागाने सर्वसामान्यांसाठी खुली केली आहेत. यातील १ ते १२ लेणी भगवान गौतम बुद्ध, त्यांच्या जीवनातील प्रसंग, बौद्ध धर्म याबाबत आहेत. पुढे लेणी क्र. १३ ते २९ अशा एकूण १७ लेणी या हिंदू धर्माविषयी, तर लेणी क्र. ३० ते ३४ या जैन धर्मविषयक दर्शन घडवितात. एकाच ठिकाणी वेगवेगळ्या तीन धर्मांची महती सांगणारे वेरूळ वैशिष्ट्यपूर्ण ठिकाण ठरते. ही लेणी म्हणजे बौद्ध, हिंदू आणि जैन धर्मगुरू, यात्रेकरू, वाटसरू व इतरांसाठी प्राचीन काळामध्ये व्यापारी मार्गावरील एक ठिकाणही होते. या लेण्यांच्या निर्मितीचा कालखंडही वेगवेगळा आहे. पहिल्या १२ बौद्ध लेणी साधारणतः ५ ते ७ व्या शतकात घडविल्या गेल्या. पुढील १३ ते २९ ही हिंदू लेणी आठव्या व नवव्या शतकाच्या दरम्यान, तर शेवटच्या ५ जैन लेणींची निर्मिती नवव्या ते अकराव्या शतकादरम्यान झाली. सोळाव्या लेणीतील कैलास मंदिर हे केवळ एका दगडामध्ये कोरलेले असल्यामुळे ते शिल्पकलेतील जागतिक आश्चर्य मानले जाते. भारत सरकारने त्याला इसविसन १९५१ साली राष्ट्रीय स्मारक म्हणून मान्यता दिली. त्यानंतर इसविसन १९८३ मध्ये युनेस्कोने त्याचा समावेश जागतिक वारसा स्थळांच्या यादीत समावेश केला.
डॉ. मॅनेजर सिंग यांनी १२ क्रमांकाच्या लेणीच्या भित्तिचित्राच्या गिलाव्याचे नमुना घेतले होते, ती तीन मजली आहे. ती बौद्ध भिक्कू, उपासक आणि अभ्यासक यांच्याकडून उपयोगात आणली जात असावी. या लेणींची निर्मिती तत्कालीन, स्थापत्यकलेतील तज्ज्ञ आणि कारागिरांनी वेरूळच्या डोंगरांमधील अग्निजन्य खडक फोडून केली आहे. तिची निर्मिती अतिशय उच्च पातळीची आहे. गुहेतील दगडी ओबडधोबड भिंतींवर स्थानिक चिकण माती आणि इतर घटक वापरून गिलावा करण्यात आला. या मातीच्या थरावर अजून दोन थर चुन्याचे देऊन त्यावर चित्रे काढली गेली. सुदैवाने किंवा दुर्दैवाने वेरूळची लेणी सुरुवातीपासूनच स्थानिक जनता, वाटसरू आणि इतरांच्याही दृष्टिपथात राहिला. विविध आक्रमणे, समाजकंटकांचा उपद्रव आणि काळाच्या ओघात अनेक मूर्ती आणि भित्तिचित्रांचेही मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले.
उलगडा होण्याच्या दिशेने...
हे सर्व पैलू समजून घेत दरम्यानच्या काळात रोज काही वेळ मातीचा एक एक कण सूक्ष्मदर्शकाखाली पाहत होतो. त्यात काही सापडतेय का हेही शोधत राहिलो. सुदैवाने मला त्यामध्ये काही धागे, पानांचे छोटे तुकडे आणि एक फूल मिळाले. पानांचा रंग बऱ्यापैकी हिरवा होता. पण फुलातील आतील सर्वच भाग गायब होते, पण त्याच्या पाच पाकळ्या मात्र बऱ्यापैकी सुस्थितीत होत्या. वनस्पतिशास्त्राच्या वर्गीकरण शास्त्राच्या नियमानुसार, झाडाच्या मुळापर्यंत पोहोचण्यासाठी इतके पुरावे पुरेसे होते. यासाठी वर्गीकरण अद्ययावत सिस्टिमचा मात्र काहीच उपयोग झाला नाही. याउलट साधारणतः दीडशे वर्षांहून जुनी असणारी जॉर्ज बेंथाम आणि जोसेफ हूकर यांनी शोधलेली सिस्टिम मात्र उपयोगात आली. त्यानुसार परीक्षण केल्यानंतर असे लक्षात आले की हे फूल द्विदल वनस्पतींच्या 'अपेटाली' वर्गात बसत आहे. अपेटाली समूहातील वनस्पतींच्या फुलांमध्ये पाकळ्यांचे एकच दल असते.
पुरातत्वशास्त्राच्या नियमानुसार, ऐतिहासिक काळातील मोठ्या प्रमाणावर होणाऱ्या कोणत्याही निर्माणकार्यात स्थानिक पातळीवर उपलब्ध असणाऱ्या वस्तू व साधनांचाच वापर केला जातो. म्हणजेच या लेणीत वेरूळ आणि आसपासच्या भागात ज्या वनस्पती उगवतात, त्यातलीच एखादी वापरली गेली होती. सुदैवाने स्व. वा. ना. नाईक आणि त्यांच्या विद्यार्थ्यानी लिहिलेला मराठवाड्याचा वनस्पती कोष आणि नोंदविलेल्या प्रत्येक वनस्पतींच्या जातीचे जतन केलेले शुष्क नमुने डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या वनस्पतिशास्त्राच्या संग्रहालयात उपलब्ध आहेत.
सांगता काय... गांजा?
मग मराठवाड्यात आढळणाऱ्या अपेटाली वर्गातील सर्व जातींची एक यादी केली. सोबत वेरूळच्या गुहेतील भित्तिचित्रात मिळालेल्या फुलाचा नमुना होताच. त्याची माजमापे आणि पाकळ्यांचा आकार इत्यादींचा वापर करून तयार केलेल्या यादीतील वनस्पतींशी तुलना केल्यावर केवळ तीनच जाती शिल्लक राहिल्या. या तीनही जातींचे शुष्क नमुने तपासले, त्यातही दोन जुळल्या नाहीत. शेवटी एकच शिल्लक राहिली, आणि तो होता गांजा. दुर्दैवाने तुलना करण्यासाठी गांजाचे नमुने मात्र संग्रहालयात उपलब्ध नव्हते. त्यामुळे तो गांजाच आहे हे पक्के व्हायचे बाकी होते. सहकारी आणि मित्रांना हे सांगितले. गांजा म्हटल्यावरच त्यांच्यासह अनेकांच्या भुवया उंचावल्या. पण गांजाचे नमुने नसल्याने तुलना करायची तर कशी?
त्यातूनही मार्ग निघाला. दिल्लीसह उत्तरेकडील बहुतांश राज्यांमध्ये निसर्गतःच गांजा अगदी गाजर गवताच्या बरोबरीने तण म्हणून वाढतो. मग दिल्लीतून काही नमुने मागविले आणि त्याची तुलनात्मक चिकित्सा केली. मग असे लक्षात आले की गिलाव्यात वापरलेली वनस्पती गांजाच आहे. पुढे त्यातील बारकाव्यांचा शोध साध्या आणि इलेक्ट्रॉन सूक्ष्मदर्शकाखाली घेतला. तसेच, त्याचे रासायनिक परीक्षणही केले. त्यानंतर ती वनस्पती गांजा असण्यावर शिक्कामोर्तब झाले. पण त्यामुळे तिथे गांजाच का वापरला आणि किती प्रमाणात वापरला? त्याची लागवड केली जात होती की तो नशेसाठी वापरला जात होता? असे अनेक प्रश्न उभे राहिले.
वेगळ्याच कारणासाठी जगभर प्रसार
ही वनस्पती होती, ‘कॅनाबीस सॅटिवा’ (Cannabis sativa). ती भारतीय उपखंडात गांजा, भांग, चरस, हशीष इत्यादी नावांनी ओळखली जाते. गांजाची लागवड सर्वसाधारणतः दहा ते बारा हजार वर्षांपूर्वी चीनच्या उत्तरेकडील भागामध्ये झाली. लागवडीचा मूळ उद्देश मात्र त्याच्यापासून मिळणारा धागा हा होता. प्राचीन काळी बहुतांश जहाजे, बोटी, किंवा इतरत्र वापरल्या जाणाऱ्या दोरखंडांमध्ये गांजापासून तयार केलेल्या दोरखंडांचे प्रमाणच सर्वांत मोठे होते. आणि त्यासाठीच त्याचा प्रसार जगभर झाला. भारतीय भूमीत गांजा साधारणतः दोन हजार वर्षांपूर्वी अफगाणिस्तानमार्गे आला आणि प्राचीन व्यापारी मार्गांवरून तो दक्षिणेत पोहोचला.
कालांतराने घायपातासारख्या झाडांपासूनसुद्धा दोर बनविले जाऊ लागले आणि गांजाच्या दोराचे महत्व कमी होत गेले. परंतु, त्यानंतर मात्र गांजाचा उपयोग वेगळ्या कारणासाठी वाढला. त्याच्या नशा आणणाऱ्या गुणधर्मासाठी तो अधिक प्रमाणात वापरला जाऊ लागला. तो इतका वाढला की अगदी भारतीय संस्कृतीचा भागच होऊन गेला. ब्रिटिशांना इसविसन १८६० च्या दरम्यान गांजावर अगदी कर लावला. गांजामध्ये असणारा ‘टेट्राहैड्रोकॅनाबिनॉल’ हा घटक असतो. तोच नशा आणण्यासाठी वापरला जातो. गांजाचे वैशिष्ट्य म्हणजे याची नर आणि मादी अशी वेगवेगळी झाडे असतात. नर झाडामध्ये ‘टेट्राहैड्रोकॅनाबिनॉल’ अतिशय कमी प्रमाणात असतो, तर तो मादी झाडामध्ये मोठ्या प्रमाणावर असतो. याचाच अर्थ मादी झाड अधिक मादक असते. उत्तर भारतामध्ये गांजा तण म्हणून मुबलक प्रमाणात वाढतो. गांजामध्ये बुरशीरोधक तसेच कीडरोधक असे गुणधर्मही असतात. त्यामुळे त्याच्यापासून वापरलेल्या गोष्टी आर्द्रता असली तरी लवकर खराब होत नाहीत. त्यामुळेच कदाचित गांजा वेरूळ लेण्यांमधील भित्तिचित्रांच्या गिलाव्यात वापरला गेला असावा.
गांजाच्या धाग्यांचे असेही गुणधर्म
याची उदाहरणे जगाच्या इतर भागातही पाहायला मिळतात. विशेषत: इंग्लंडमधील जुन्या दगडी इमारतींच्या बांधकामांमध्येही गांजाचे धागे आढळतात. त्याचा वापर प्रामुख्याने उष्णता अवरोधक म्हणून होतो. युरोपमध्ये हिवाळ्यात आणि उन्हाळ्यात असणाऱ्या तापमानामध्ये होणाऱ्या बदलांचा इमारतीच्या अंतर्गत भागात फारसा फरक पडत नाही. पण या इमारतींमध्ये वावरणाऱ्या लोकांच्या घामामुळे, श्वासोश्वासामुळे किंवा इतर कारणामुळे निर्माण होणारी आर्द्रता शोषून घेण्याचे कामही हे गांजाचे धागे करतात. त्यामुळे दमटपणामुळे भिंतींवर तयार होणारी बुरशी किंवा तत्सम कोणत्याही प्रकारची हानी होत नाही. कदाचित हेच तंत्र आपल्या पूर्वजांनी शेकडो वर्षांपूर्वी वापरले असावे. वेरूळच्या या गुहांमध्ये शेकडो वर्षे इतकी माणसे वावरली असतील, त्याद्वारे तयार झालेली आर्द्रता भित्तिचित्रांच्या गिलाव्यामध्ये वापरलेल्या गांजाने शोषली असेल. गांजामध्ये असलेल्या बुरशी आणि कीडरोधक गुणधर्मामुळे आजही जवळपास १५०० ते १६०० वर्षानंतरही ही सर्व भित्तिचित्रे अजूनही शाबूत आहेत. मराठवाड्यातील तापमानात मोठी विषमता आहे. पण गांजाच्या उष्णतारोधक गुणधर्मामुळे या विषमतेचाही त्यावर फार मोठा परिणाम झालेला दिसत नाही.
गांजाची नर झाडे प्रामुख्याने उष्ण आणि कोरड्या वातावरणात वाढतात, तर मादी झाडे विशेषत: थंड आणि जास्त आर्द्रता असणाऱ्या वातावरणात वाढतात. पाश्चिमात्य देशांमध्ये संप्रेरकांचा उपयोग करून किंवा तत्सम तंत्रज्ञान वापरून, उगवणाऱ्या बिया नर किंवा मादी झाडांमध्ये रूपांतरित केल्या जातात. पुरातत्वशास्त्राच्या नियमानुसार, स्थानिक पातळीवर उपलब्ध असणाऱ्या वस्तूंचाच वापर कोणत्याही निर्माणकार्यात केला जातो. म्हणजेच त्या काळात वेरूळच्या परिसरात गांजाची लागवड मोठ्या प्रमाणावर केली जात होती. पावसाळ्यात बांधकामासाठी उपलब्ध असणारे मुबलक पाणी वापरून हा गिलावा केला जात असावा. पावसाळ्यातील मोठ्या प्रमाणात असलेली आर्द्रता आणि कमी तापमान असूनही एकही फळ किंवा बी मिळाले नाही, याचा अर्थ असा होतो की आपल्या पूर्वजांना झाडांमधील लिंगबदलाचे तंत्र माहित होते का?
बौद्ध धर्माच्या पंचशील सूत्रानुसार, सद्विवेक बुद्धीचा तोल ढासळविणारा कोणताही पदार्थ सेवन करणे वर्ज्य आहे. त्यामुळे तत्कालीन निर्माणकर्ते गांजाचे सेवनच करत नसावेत. याचा उपयोग या धाग्यासाठीच केला जात असावा, असेही म्हणता येईल.
असा हा गूढ गांजाचा आगळा वेगळा शोध.. अगदी विस्मयकारक ठरलेला !! 

लेणी क्र. ३३: जगन्नाथसभा 
जगन्नाथ सभा' ह्या नावाचे हे लेणे दुमजली असून आतमध्ये नक्षीदार स्तंभांवर तोलले गेले आहे. या लेण्याचे स्वरुप तिन्ही बाजुने खोदलेले लेणे संकुल असे आहे. या संकुला विवीध आकाराची लेणीमंदीरे असून त्यांचे तलविन्यास वेगवेगळे आहेत.जगन्नाथ सभेच्या खालच्या मजल्यावर दोन छोटी (जे २२ व जे २३ ) व दोन मोठी (जे २४ व जे २५ ) लेणी मंदीरे आहेत.
व्हारांडा आणि त्यामागे मंडप अशी जे २२ ची रचना आहे. मंडपाच्या मागच्या भिंतीत मधोमध असलेल्या देवकोष्टात लेण्यातील मुख्यमुर्ती म्हणजे बसलेला तीर्थंकर. या भिंतीच्या एका टोकाला सर्वानुभुती यक्ष आणि दुसर्‍या कडेला अंबिका यांच्या मुर्ती आहेत. मंडपाच्या भिंतीवर बसलेल्या तीर्थंकरांचे दोन पट्ट आहेत. यातील डाव्या भिंतीवरील शिल्पपटात पार्श्वनाथ, सर्वानुभुती यक्ष, यक्षी आणि भक्तगण दाखवले आहेत. मात्र इथे लेण्यातील सममिती (Symmetry ) जाणवत नाही.
जे २३ हे लेण मात्र सममितीत आहे.खांब नसलेला मंडप आणि त्याच्या मागे गर्भगृह अशी याची रचना. मंडपच्या मागील भिंतीच्या एका टोकाला सर्वानुभुती यक्ष आणि दुसर्‍या कडेला अंबिका यक्षी यांच्या मुर्ती आहेत. मंडपाच्या बाजुच्या भिंतीवर पार्श्वनाथ आणि बाहुबली दाखवलेले आहेत.मंडपाच्या प्रवेशद्वाराच्या दुतर्फा प्रत्येकी एक तीथंकर दाखवला आहे.गर्भगृहाच्या तिन्ही भिंतीवर बसलेल्या तीर्थंकराच्या मुर्ती आहेत.
जे २४ लेण्याचा तलविन्यास स्तंभमुखी व्हरांडा, त्यामागे तितक्याच रुंदीचा मंडप , त्यानंतर अंतराळ मागे गर्भगृह असा आहे.मंडप चार स्तंभावर असून बाजुच्या भिंतीत उपगर्भगृह आहेत. व्हरांडा आणि गर्भगृहामध्ये अंबिका, यक्षी , सर्वानुभुती यक्ष, पार्श्वनाथ, बाहुबली यांची शिल्प आहेत. भिंत्,गर्भगृह अशी मिळून तीर्थंकरांची २० शिल्प आहेत.
जे २३ या लेण्यात सुध्दा २२ तीर्थंकरांच्या मुर्ती आहेत. एकंदरीत वेरुळ येथील जैन लेण्यात वारंवार बसलेल्या व उभ्या राहीलेल्या तीर्थंकरांचे मुर्तीपट कोरलेले दिसतात.
एकंदरीत शैव आणि वैष्णव लेणी आणि हि जैन लेणी यांची तुलना केली तर ब्राम्हणी लेण्यात शंकर व विष्णु यांचे कथापट दिसतात, तर जैन लेण्यात असेच कथापट तीर्थंकरांचे दिसतात.याचा अर्थ ब्राम्हणी लेण्यांपासून प्रेरणा घेउनच हि जैन लेणी नंतर कोरली गेली हे उघड आहे.
जे २५ या लेण्याचा तलविन्यास विचारात घेतला तर बाकी रचना सारखीच असून फक्त मागील भिंतीत एका एवजी तीन गर्भगृह आहेत, इतकाच फरक आहे.
जगन्नाथसभेचा तलविन्यास
Left: Cave 33 complex, upper veranda begun c. 7th or early 8th century, Ellora; right: Jina images in Cave 33 complex, c. 7th or early 8th century, Ellora (photos: Lisa N. Owen
वरच्या मजल्यावर बारा खांबांचा मंडप असून भिंतीत व गर्भगृहात तीर्थंकर प्रतिमा आहेत. महावीर प्रतिमेलाच जगन्नाथ समजून या लेण्याला त्याचे नाव दिले गेले असावे. ओसरी, सभांडप आणि गर्भगृहात महावीरांची मूर्ती अशी या लेणीची रचना. इथल्या भिंतीवर मूर्तींच्या जोडीने चित्रे सुद्धा रंगवलेली आढळतात. त्यात महावीरांच्या जीवनातील काही प्रसंग चित्रबद्ध केलेले आहेत. इथल्या छतांवरही देखणी चित्रे रंगवलेली असून अजिंठ्यातील चित्रांशी यांचे बरेच साध्यर्म्य दिसून येते. मात्र यात कथांपेक्षा नक्षीकाम, वादक, नर्तक, प्राणी अशीच चित्रे काढलेली आढळून येतात.

a

जगन्नाथसभेचा सभामंडप
a

नक्षीदार स्तंभ
a

पद्मासनस्थ महावीर आणि डावीकडे गोमटेश्वर
a

 भिंतींवर कोरलेल्या महावीर मूर्ती व चवरी ढाळणारे गंधर्व ( मूर्तीच्या मस्तकावरील तिहेरी छत्राची संकल्पना बौद्ध कलेतून आली हे उघड आहे)
a

महावीर, गजारूढ मातंग यक्ष आणि गोमटेश्वर
a 

 सिद्धायिका आणि गोमटेश्वर

a 

 पार्श्वनाथ

a

गर्भगृहातील महावीर
a

जगनाथसभेतील भित्तीचित्रे
a 

 स्तंभ आणि छतांवरील नक्षी
a 

 कुठलासा एक प्रसंग
a

एका ठिकाणी बैलाचे चित्र रंगवलेले आहे. 
a

नृत्याच्या प्रसंगाचे एक अप्रतिम चित्र
a

नर्तकांचेच अजून एक चित्र

लेणी क्र. ३४.
हे शेवटचे जैन लेणे तसे लहानसेच असून अग्रमंडप, सभामंडप, अंतराळ आणि गर्भगृह या योजनेचे असून, येथेही तीर्थंकर आणि गोमटेश्वर ह्यांच्या प्रतिमा कोरलेल्या आहेत.
काही अपवाद वगळल्यास या लेण्यांतील मूर्ती साचेबंद वाटतात. विशेषतः तीर्थंकरांच्या मूर्तींत विविधता नसून निर्जीवपणा जाणवतो. हे लेणे तसे लहानसेच असून एका बाजूला पार्श्वनाथ व दुसऱ्या बाजूला गोमटेश्वर अशा प्रतिमा आहेत. सभामंडप, अंतराळ आणि गर्भगृहात महावीरांची प्रतिमा आहे. हत्तीवर बसलेला मातंग यक्ष आणि सिद्धायिका देवीबरोबरच इथे जैन अनुयायी , आकाशगामी गंधर्व आणि साधेसेच पण नक्षीदार स्तंभ येथे कोरलेले आहेत. छतावर कमळफुलांची नक्षी आहे.
a 
 लेणी क्र. ३४ चा दर्शनी भाग

a

गर्भगृहातील महावीरांची मूर्ती

एकंदरीत जैन लेण्यांचे तलविन्यास, वास्तुशास्रीय वैशिष्ट्ये जसे स्तंभ, मुखभागावर कोरलेली शिल्प , छोटा कैलास लेण्याचे शिखर, इंद्रसभेच्या प्रांगणात असलेली शिखराची प्रतिकृती आणि मुर्तीकला याचा हिंदु लेण्याशी असलेले साधर्म्य बघता या लेण्यांचा काळ इ.स. नववे ते दहावे शतक असा सुचीत करतात. लेणे क्र. ३१ आणि पार्श्वनाथ टेकडीवर कोरलेल्या लेण्यावरुन या परिसरात लेण्यांची निर्मिती उत्तर चालुक्य काळापासून ते यादव काळापर्यंत सुरु राहीली याची साक्ष देतात.








वेरूळ जैन लेण्याप्रमाणेच अनेक प्राचीन जैन मंदिर/ठिकाणे पाहण्या सारखी आहेत.
१. सावरगाव,तुळजापूर जवळ - सुंदर नक्षीकाम.
२. हुमचा,कर्नाटक. - उत्कृष्ट कोरीवकाम [मिपा वर आधीच माहिती आली. दुवा शोधून टाकतो इथे.]
3. कसमलगी,कर्नाटक - भगवान पार्श्वनाथांची मूर्ती खड्गासनात आहे. या मुर्ती चा रंग दिवसाच्या प्रहरा प्रमाणे बदलतात.
४. सहस्त्रफणी पार्श्वनाथ मंदिर, विजापुर - मुर्तीवरील नागास १००० फणे आहेत. मुख्य फण्यावर पाणी / दुधाची धार धरल्यास, उर्वरित ९९९ फण्या मधून वितरीत होते. असा अभिषेक वर्षातून काही ठराविक दिवशी होतो.
५. हाळेबीडू / मूडबिद्री, कर्नाटक - येथे जैन तीर्थंकरांच्या, पाचू माणिक, मोती इ. रत्नांच्या स्फटीकांपासून बनविलेल्या अतिशय लहान व नाजूक प्रतिमा, अत्यंत सुंदर आणि टीपीकल कर्नाटकी जुन्या मंदिरात [त्याला बहुतेक 'बसदि' असा म्हणतात] ठेवल्या आहेत.

- अनय




Outside Cave 32, we heard a shrill, high-pitched sound and scanned the escarpment for the source. I mistook it for a bird and was surprised to discover that the sound was coming from a chipmunk several feet above us.

Nearby Cave 31 contains representations of jains or tirthankaras, liberated souls who have succeeded in ending the cycle of rebirth and teach others the path to enlightenment.

 

A Buddhist monk in front of the entrance to a shrine at Cave 32

A Buddhist monk in front of the entrance to a shrine at Cave 32


Through a Jain lens

The standing meditation and omniscience of Bahubali, lower story, Cave 32, c. 9th century (Photo: Lisa N. Owen)

The standing meditation and omniscience of Bahubali, lower story, Cave 32, c. 9th century (Photo: Lisa N. Owen)

Ellora’s Jain caves provide more information in regard to patronage and the site’s internal development. Five Jain caves (Caves 30–34) are carved at the northern end of the site. The sculpted and painted programs feature Jinas, Jain deities (particularly associated with health, wealth, and abundance), and the Jain figure Bahubali.  Reliefs of Bahubali at Ellora typically present the figure flanked by two females who are in the process of removing the vines that encircle his legs. Overhead are flying, celestial couples who hold long flower garlands to honor and worship Bahubali who has just attained omniscience due to his steadfast meditation. The forest setting of this event is referenced through the vines and the small deer that gather around his feet.

In addition to these subjects, the Jain caves are also carved with numerous human worshippers, both monastic and lay. [10] Typically they are carved in gestures of homage at the feet of a Jina. Some of these figures are identified through an inscription as the patron(s) of the sculpture, such as Nagavarma and Sohila in Cave 32. Their presence points to patterns of patronage at the site that go beyond royal elites. Moreover, it appears that scenes of human devotion made an impression on later imagery carved at the site, as seen in some additions to the Kailasanatha complex that feature portraits of anonymous devotees worshipping Shiva.

While the vast majority of Ellora’s Jain caves were carved in the ninth and tenth centuries, there is some evidence that Jain artistic activity was initiated much earlier. This can be seen in the pillar type carved in the upper-story veranda of Cave 33. These pillars, with their fluted, cushion-shaped capitals and tall, plain shafts, mirror those carved in some of the site’s early Shaiva and Buddhist caves. Also supporting an earlier date for the inception of Jain activity are three Jina images carved adjacent to Cave 33. The throne bases supporting these Jinas have a cloth or fabric that drapes down and covers the central section of the base. Carved above the cloth is a double-lotus seat that visually supports the Jina. These motifs are similarly found on the thrones supporting select Buddhas at the site. [11] These elements, among others, indicate a seventh or early eighth-century date for initial Jain activity. This is significant as it demonstrates that teams of artists were working on Hindu, Buddhist, and Jain caves simultaneously during this period.

The three Jina images adjacent to Cave 33 likely served as “placeholders” until artists could resume work on the Jain caves after the completion of the monolithic Kailasanatha temple in the mid-eighth century. As a result, we also have the innovative “Chhota (small) Kailasa” at Ellora (Cave 30)—a monolithic Jain temple that replicates the Kailasanatha in terms of its process of creation, directional orientation, and main architectural components, albeit on a smaller scale. [12]

Undoubtedly, future research will reveal more evidence for the movement of artists across the site and highlight ways that Ellora functioned as a multireligious tirtha in India’s early medieval period.


No comments:

Post a Comment

मनसर

 प्रकार : गिरीदुर्ग जिल्हा : नागपुर उंची : १२०० फुट ...