Monday, March 1, 2021

आवाडे कोट

     सिंधुदुर्ग जिल्ह्याचा इतिहासाचा मागोवा घ्यायला सुरवात केली कि बर्‍याच अश्या किल्ल्यांचा उल्लेख सापडतो ज्यांचा आज साधा मागोवा ही घेता येत नाही.यांची स्थाननिश्चिती होणे,स्पष्ट अवशेष सापडणे अवघड झाले आहे.जणु इतिहासाचे हे साक्षीदार आज फक्त त्या जीर्ण कागदपत्रावरील उल्लेखापुरते राहीले आहेत.तिफणकडा,नांदोस्,फुकेरी,आचरा असे काही किल्ले फक्त कागदोपत्री अस्तित्वात आहेत. 
    आवाडे कोट हा असाच विस्मृतीत गेलेला एक कोट. दोडामार्ग तालुक्यात असलेला आवाडे कोट आजही आपल्या अंगाखांद्यावर बऱ्यापैकी अवशेष बाळगून असला तरी केवळ हा किल्ला अस्तीत्वात नाही या गैरसमजुतीमुळे कोणीही या किल्ल्याकडे फिरकत नाही. आवाडे कोट उर्फ आवर किल्ला बांदा शहरापासुन ३५ कि.मी.अंतरावर तर दोडामार्गपासून १२ कि.मी. अंतरावर आहे. दोडामार्ग-भेडशी-चंदगड रस्त्यावर हे आवरा गाव आहे.आवाडे कोट आसपासच्या परिसरात कोणाला माहीत नसला तरी आवाडे गावातील लोक मात्र या किल्ल्याची अचूक जागा दाखवतात इतकेच नव्हे तर किल्ला दाखवायला देखील येतात. 
 
आवाडे किल्ला गावाबाहेरुन वाहणाऱ्या तिलारी नदीच्या काठावर असुन या नदीचे पाणी किल्ल्याभोवती असलेल्या खंदकात फिरवले आहे. आजही या नदीचे पाणी काही ठिकाणी खंदकात आलेले दिसते. 
 
किल्ल्याच्या आतील व बाहेरील बाजुस मोठया प्रमाणात बांबुची झाडे वाढलेली असुन आपला प्रवेश हा खंदकात उतरुन नंतर किल्ल्यात होतो. 
 
खंदकाची रुंदी साधारण १५ फुट असुन खंदकात साठलेल्या मातीमुळे खोलीचा अंदाज करता येतय नाही. 
 
किल्ल्याचा मुख्य दरवाजा पुर्णपणे उध्वस्त झाला असुन त्याचे नक्की ठिकाण सांगता येत नाही. आपला किल्ल्यातील प्रवेश हा उध्वस्त तटातुन होतो. 
 
साधारण चौकोनी आकाराचा हा किल्ला एक एकरवर पसरलेला असुन किल्ल्याच्या तटबंदीत चार टोकाला चार बुरुज असावेत कारण तीन टोकाला तीन बुरुज असुन चौथ्या टोकाला मोठया प्रमाणात झाडी वाढलेली असल्याने तिथपर्यंत जाता येत नाही. 
 
किल्ल्याचे बुरुज व तटबंदी घडीव चिऱ्यात बांधलेली असुन तटाची उंची केवळ चार ते पाच फुटापर्यंत शिल्लक आहे. बुरुजाची उंची थोडी जास्त असली तरी त्यावर मोठया प्रमाणात झाडे वाढली आहेत. 

किल्ल्यातील झुडुपातून वाट काढत फेरी मारताना १५ x २५ फुट आकाराची चारही बाजुच्या भिंती शिल्लक असलेली एक पडकी वास्तु पहायला मिळते. याशिवाय किल्ल्याच्या तटबंदीत एक शौचकुप व अंतर्गत भागात काही घरांचे चौथरे आहेत. 
 
किल्ल्यात पाणी पुरवठा करण्यासाठी एक चौकोनी आकाराची बांधीव विहीर असुन या विहिरीत आजही पाणी असते पण वापरात नसल्याने हे पाणी पिण्यायोग्य नाही. 
 
गावकरी तटाच्या आतील भागात असलेला एक भाग तालीम म्हणुन दाखवतात. या भागाकडे जाण्यासाठी एक लहान दरवाजा पहायला मिळतो. झाडीझुडपातुन वाट काढत संपुर्ण किल्ला पहाण्यास अर्धा तास लागतो पण अवशेष दाखवण्यासाठी स्थानिक माणूस सोबत असायला हवा. 
  या नष्टप्राय झालेल्या किल्ल्याचा थोडाफार इतिहासात उल्लेख आहेत. वाडीकर फोंड सावंत यांनी इ.स.१७३२ च्या सुमारास पोर्तुगीजाच्या गोवा हद्दीजवळ आवाडे कोट बांधला. पोर्तुगीज सरहद्दीजवळ असल्याने याला महत्व होते. एका पत्रात या किल्ल्याचा उल्लेख येतो, तो असा "विश्राम अनंत सबनीस फोंड यांचे कारकीर्द दिवाडी बारदेश येथे गेले काही वर्ष होते.नंतर वाडीस आले.उपर आवाडेचा कोट नाग सावंत ( दुसर्‍या खेमसावंतांचा मुलगा ) याकडे होता.ती मसलत राजश्री सुधा फौज गेलेवर विश्राम शेणवी आवाडेस पडले"
   इ.स.१७३८-५५ च्या दरम्यान वाडी संस्थानात वारसाहक्काची भांडणे चालू असताना नानासाहेब पेशवे यांनी रामचंद्र सावंत यांना लिहिलेल्या पत्रात या किल्ल्याचा उल्लेख आला आहे. "जिवाजी विश्राम यांस सांगून हुजुर पाठविणे येवेसी आज्ञा करणे ते विठ्ठल विश्रामास केली,असे हे तुम्हास लिहीतील त्यावरुन कळेल.आवाडियाचे ठाणे खालील ते किल्ल्याकडेच अस्सिले पाहिजे तर किल्ल्याकडे देणे जाणिजे"मात्र पुढे या घटनेत काय झाले याची माहिती मिळत नाही.
    त्यानंतर दुसऱ्या खेम सावंतांचा मुलगा नाग सावंत यांनी पंतअमात्य यांना आवाडे येथुन लिहिलेल्या पत्रात या कोटाचा उल्लेख येतो.ते पत्र असे "आपली व आमची भेट व्हावी त्यामुळे लक्ष मनसुबे घडतील.आम्हास कायावाचामने करुन आपली भेट व्हावी हेच बहु आवश्यक आहे.याउपरही आम्ही आम्ही आवाडेचे मुक्कामीहून बुधवारी कुच करुन मजल दरमजल येतो". 
      इ.स.१७४६ मधील ऑक्टोबर महिन्यात सांखळीकर राणे व इतर देसाई सावंतांचा पक्ष सोडुन पोर्तुगीजांना सामील झाल्यावर सत्रोजी राणे यांनी सावंतांचा आवाडो,मोर्ले व सातारे हे कोट पोर्तुगीजांच्या ताब्यात दिले.यात उल्लेख केलेला आवाडो कोट म्हणजेच आवर कोट होय. त्यानंतर हा कोट पुन्हा सावंतांच्या ताब्यात आल्याचे दिसते कारण इ.स.१८३२ मध्ये या किल्ल्यात असलेल्या लोकांची यादी व खर्चाची तरतुद सावंतवाडी दफ्तरात सापडते.सन १८३२ च्या उल्लेखाप्रमाणे किल्ल्यात किल्लेदार्,कारखानीस्,तासजी,३५ लोक्,कुणबीण हे लोक होते.किल्ल्यासाठी ९७३ रुपयाची तरतुद होती.
     दगडमातीने बांधलेल्या या किल्ल्याची सन १८४३ मध्ये अवस्था कशी होती याचे वर्णन त्यात आहे.किल्ल्याच्या सभोवताली खंदक आहे.त्यात काटेरी झाडेझुडपे व बांबुची दाट बेटे होती.किल्ल्याच्या उत्तर तटाबाहेर बुरुज बांधलेला होता.मुख्य किल्ला व हा बुरुज याच्यामध्ये रस्ता होता.या रस्त्याच्या एका बाजुला तटबंदी तर दुसर्‍या बाजुला वेळूची दाट बेटे होती. किल्ल्याचा दरवाजा अतिशय मजबुत असला तरी त्याला पुरेसे संरक्षण दिलेले नव्हते.
    इ.स.१८४४-४५ मध्ये करवीर प्रांतात ब्रिटीश सरकार विरुध्द उठाव झाल्याने या भागातील अनेक किल्ले पाडले गेले त्यात आवाडे कोट उध्वस्त केला गेला.
 
संदर्भग्रंथ :-
१)  सिंधुदुर्ग जिल्हा गॅझेटीयर
२) गड्,कोट सिंधुदुर्ग जिल्ह्यातील - सतिश अक्कलकोट
३) महाराष्ट्र देशातील किल्ले - चिंतामण गोगटे
४) www.durgbharari.com  हि वेबसाईट

 

 



























© Suresh Nimbalkar

No comments:

Post a Comment

मनसर

 प्रकार : गिरीदुर्ग जिल्हा : नागपुर उंची : १२०० फुट ...