Saturday, February 27, 2021

सिध्दगड ( मालवण )

        प्राचिनकाळी मालवण बंदर, आचरा बंदर या ठिकाणी उतरणारा माल अनेक मार्गांनी घाटावरील बाजारपेठात जात असे. या मार्गांचे रक्षण करण्यासाठी त्याकाळी मोक्याच्या जागी किल्ले बांधण्यात आले. सिंधुदूर्ग जिल्ह्यातील सिध्दगड हा किल्ला मालवण, आचरा बंदरहून घाटमाथ्यावरील आजरा या बाजारपेठेकडे जाणार्‍या मार्गावरील घोटगीच्या घाटावर व कसाल नदीवर लक्ष ठेवण्यासाठी बांधण्यात आला होता.
      या गडाच्या इतिहासात डोकावल्यास सावंतवाडीच्या खेमसावंत यांनी पेशव्यांना सन १७४२ मध्ये लिहीलेल्या पत्राचा संदर्भ घेतल्यास हा गड सावंतानी बांधला असावा. "सिधगड आम्ही पुरातन कुडाळ प्रांतामध्ये बांधला.तुळाजी आंगरे याणी दगा करुन घेतला.उभयता घर कलह लागला.तेव्हा सहजच तुळाजी आंगरे याजपाशी राहीला.हली सरकारात घेतला आहे.आम्हाकडील लोकांनी घेतला आहे.तो आम्हाकडेच द्यावा".
         आंग्रे व सावंत यांच्यात सुरवातीपासूनच वैर होते.त्यात तुळाजी व नानासाहेब पेशवे यांचे पटेना.यामध्ये दोघांंनी एकमेकाच्या मुलुखावर चढाई सूरु केली.त्यात सावंत व करवीरकर यांच्यातही वितुष्ट निर्माण झाले.करवीरकर व सावंत यांच्या वादात पेशवे आपल्याला सहाय्य करतील या कल्पनेने सावंतांनी पेशव्यांची बाजु घेउन आंग्रेबरोबर युध्द सुरु केले.यात १७४८ -४९ मध्ये तुळाजी आंग्रेंनी सावंताच्या मुलुखावर चढाई करीत सिध्दगडावर हल्ला केला आणि तो ताब्यात घेतला.हे बघून सावंतानी पेशव्यांना पत्र लिहीले "आम्ही सदाशिवपंत यांचे दर्शनास गेलो,ते प्रसंगी मागे ( आंग्रेनी ) सिध्दगड त्वाही घेतला. आम्ही भरतगड ( परत ) घेतला.सिधगड आंग्रे यांकडे राहीला आहे. ते मुलकात धामधुम करायास चुकत नाहीत. शिबंदी ठेवली".सांवतांचे तोकडे सैन्य पहाता ते आंग्यांचा मुकाबला करु शकणार नाहीत हे लक्षात घेउन पेशव्यांनी सावंताच्या मदतीला कुमक धाडली होतीच. नानासाहेब पेशव्यांनी सन १७५५ मध्ये तुळाजी आंग्रे यांच्याविरुध्द मोहीम उघडली. पेशव्यांनी परक्या ईंग्रजांची मदत घेउन तुळाजी आंग्रे यांचे आरमार म्हणजे खरतर मराठ्यांचे आरमार विजयदुर्गांच्या साक्षीने बुडवले.यावेळी सिध्दगड तुळाजींकडे होता. पेशव्यांचे सैन्य खंडोजी मानकर व कृष्णाजी महादेव यांच्या नेतृत्वाखाली सिध्दगडावर चालून आले.सोबत सावंतांचे सैन्य होतेच.सिध्दगडाला पक्का वेढा बसला आणि फेब्रुवारी १७५६ मध्ये सिद्धगड पेशव्यांच्या ताब्यात आला.मात्र तुळाजी आंग्रांचे पारिपत्य करुन मोहीम संपली तरी सिध्दगड काही पेशव्यांनी सावंताना दिला नाही.हे पाहून खेम सावंतांनी सन १७४२ मध्ये पेशव्यांना पत्र लिहीले " सिधगड आम्ही पुरातन कुडाळ प्रांतामध्ये बांधला.तुळाजी आंगरे याणी दगा करुन घेतला.उभयता घर कलह लागला.तेव्हा सहजच तुळाजी आंगरे याजपाशी राहीला.हली सरकारात घेतला आहे.आम्हाकडील लोकांनी घेतला आहे.तो आम्हाकडेच द्यावा". 
    अर्थात पेशव्यांनी सावंताच्या विनंतीकडे दुर्लक्ष केले.पेशव्यांच्या सैन्याशी लढून सिध्दगड मिळवणे अशक्य असल्याचे लक्षात घेउन सावंतांनी महादजी शिंदे यांच्या मातोश्री निंबाबाई यांना मध्यस्थी करण्यास सांगून सिध्दगड आपल्याला मिळवून देण्याची गळ घातली.निंबाबाई यांनी नानासाहेब व भाउसाहेब यांना विनंती केली "सिध्दगड व सालसी सावंतवाडीकर यांना परत करावे. सावंत यांचा सिदगड व सालसी त्यांचा मुलुख त्यांना परत द्यावा". अखेर पेशव्यांनी सावंतांचा मुलुख त्यांना दिला.
विशेष म्हणजे हाच सिध्दगड सावंतांना पुढे स्वखुषीने पेशव्यांना द्यावा लागला.त्याचे झाले असे सन १७७७-७८ मध्ये करवीरकरांनी सावंतांवर स्वारी केली.करवीरकरांना सिध्दगड मिळू नये यासाठी सिध्दगड पेशव्यांनी आपल्या ताब्यात घ्यावा यासाठी २६ मार्च १७८८ रोजीच्या पत्रात गंगाधर गोविउंद लिहीतात, "महाराज करवीरकरांनी सावंतांचे नरसिंहगड व भरतगड घेतले.ते समई सिदगडाचे सुत्र आम्हाकडे आले.त्यावरुन सरकारचे ( म्हणजे पेशव्यांचे ) निशाण पाठवून किल्ल्याचा बंदोबस्त केला. त्यास सिदगड किल्ला हा तालुके विजयदुर्गाच्या सरहदेवर आहे.वास्तव लोक पाहिजेत त्यास नामजद पाठवावे अगर जदीद ठेवावयाची आज्ञा असावी व महाराजाकडील कोणी बोलावयासी येणार आहे.".
   यावर बालाजी जनार्दनानी गंगाधर यांना लिहीले "सिदगडावर निशाण चढवून बंदोबस्त केला व आरमार स्वारीस रवाना केले उत्तम आहे.लोक तुर्त नामजद ( गडावर ) पाठवावयाचे नाहीत व जदीदही ठेवू नयेत.महाराजांकडील बोलाववयास येणार आहे तो आल्यावर बोलण्याचा मजकूर लिहून पाठवावा समजोन उत्तर जाईल.त्याप्रमाणे करावे. उभयताकडून ( करवीर व सावंत ) सरकार तालुकियास कोणेविसी उपद्रव होणार नाही ते पहावे".
  यावेळी मात्र पेशव्यांनी आपल्या ताब्यात घेतलेला सिध्दगड करवीरकरांच्या फौजा माघारी फिरताच सावंतांना परत केला.मात्र पुढे पेशवे -सावंत असा संघर्ष निर्माण झाला.पेशव्यांनी सावंताच्या विरुध्द कुडाळच्या नारायण प्रभुंच्या मदतीस नारो त्रिंबक यांना पाठवून दिले.त्यांनी सिध्दगडावर हल्ला करुन तो घेतला.सावंताना पुन्हा एकदा सिध्दगड लढून जिंकणे अशक्य होते.विशेष म्हणजे त्यांनी पुन्हा एकदा शिंदे यांना मध्यस्थी घालून शिंदे यांचे सरदार जिवबादादांच्या मध्यस्थीमुळे डिसेंबर १७९३ मध्ये पेशव्यांनी सिध्दगड सावंतांना परत दिला.मात्र किल्ला देताना किल्ल्याचा मागील खर्च म्हणून २२ हजार रुपये घेतले.
      सिध्दगडाचा हा संघर्ष ईथेच संपला नाही.पुढे सन १८०५-०६ मध्ये सावंतांच्या आपापसात वारसा हक्काचा संघर्ष सुरु असताना बंडाळी माजली.त्यात फोंड सावंतानी करवीरकरांना मदतीला बोलावले.करवीरकरांचे सैन्या आल्यावर फोंड सावंतानी ईतर किल्ल्याबरोबर सिध्दगड देखील त्यांना देउन टाकला.अर्थात यावेळी गडाचे किल्लेदार नारायण रुद्राजी हे सावंताशी एकनिष्ट असल्यामुळे त्यांना करवीरकरांचा अमंल गडावर नको होता.त्यांनी वेगळीच क्लुप्ती लढवली.साळशी महालाचा पेशव्यांचा अंमलदार चिटकोपंत यांच्यांकडून पैसे घेउन सिध्दगड त्यांच्या हवाली केला. पुन्हा एकदा सावंताना सिध्दगडाचा विरह सहन करावा लागला.मात्र यावेळी त्यांच्याकडे लढून गड ताब्यात घेण्याचे ना बळ होते ना कोणी मध्यस्थी करुन पेशवे गडाचा ताबा सोडण्याची शक्यता नव्हती. इक्डे सावंतांच्या घराण्यातील अंतर्गत वाद विकोपाला गेला होता.फोंड सावंत विरुध्द लक्ष्मीबाई व रावसाहेब या संघर्षात फोंडने करवीरकरांचा रागंण्याचा किल्लेदार राणोजी निंबाळकर व साळशी येथील पेशव्यांचा अंमलदार चिटकोपंत यांच्याकडे मदतीची मागणी केली.निंबाळकर रांगण्यावरील तर चिटकोपंत नुकत्याच ताब्यात घेतलेल्या सिध्दगडावरील शिबंदी घेउन मदतीला निघाले. आकेरी येथे या दोन्ही फौजा मिळून पोहचल्या असत्या राणोजीने चिटकोपंतांना कैद करुन त्यांना सिंधुदुर्गात कैद करुन ठेवले व सिध्दगडास वेढा घातला.त्याच्या मदतीला सिंधुदुर्गावरुन फौज आली मात्र सिध्दगडाने तिखट प्रतिकार केला.अखेरीस करवीरकरांना सिध्दगड घेता आला नाही.त्याचवेळी तिकडे सावंतवाडीला रावसाहेब वारला.
पुढे सप्टेंबर १८१७ च्या पत्रात सिध्दगडाचा एक उल्लेख मिळतो "दौलतराव शिंदेच्या पत्रावरुन फरांसीस (पोर्तुगीज ) मदतीसाठी गोव्याहून पलाड सिदिगडास आले आहेत.याकरिता कोकणार ;लोकास धाक पडला आहे."मात्र या घट्नेत पुढे काय घडले समजत नाही.
    इंग्रज-मराठा अखेरच्या संघर्षात मार्च १८१९ मध्ये कर्नल इम्लाक सिध्दगडाजवळ दाखल झाला.मात्र त्याच्याकडे पुरेसे सैन्य व तोफा नसल्याने त्याने हल्ला केला नाही,.मात्र बाणकोटवरुन ८९ वे रेजिमेंट मदतीस आल्याने त्याने बेत बदलून १५ मार्च रोजी सिध्दगडाच्या दिशेने कुच केली.१६ मार्च रोजी ब्रिटीश फौजा सिध्दगडाच्या तटाबंदीवर आग ओकू लागल्या,आता प्रतिकार करणे कठीण आहे हे समजून गडाची शिबंदी गड सोडून पसार झाली.इंग्रजांनी सिध्दगडाचा ताबा घेतला.इंग्रजांचे सैन्य २७ मार्च पर्यंत ईथेच राहुन २८ मार्च रोजी भरतगडाचा ताबा निघाले.
मात्र बहुधा हा गड इंग्रजांनी करवीरकरांना दिलेला असावा.कारण १ सप्टेंबर १८१९ रोजी करवीरच्या राणी सईबाई यांना पुत्ररत्न झाले त्याच्या साखरेची पत्र सिध्दगडावर रवाना केली गेली.मात्र सिध्दगडाचा यापुढचा इतिहास अज्ञात आहे.सिध्दगडाला सोनगड असेही एक नाव आहे.
    सिंधुदुर्ग जिल्हाच्या मध्यातून गेलेला मुंबई गोवा महामार्ग दक्षिण-उत्तर गेला आहे.या महामार्गावरील कसाल या गावापासून सिध्दगडावर जाणे सोयीचे आहे.ओवळीयेचे हे सिध्दगडच्या पायथ्याचे गाव आहे. सिंधुदूर्ग जिल्ह्यातील मालवण व कणकवली या दोनही शहरातून येथे जाता येते.
१) मालवण - आचरा मसदे - ओवळीये - सिध्दगड (३५ किमी) किंवा मालवण (३३ किमी) - कसाल - (३ किमी) ओवळीये.
२) कणकवलीहून मुंबई - गोवा महामार्गाने कुडाळकडे जाताना कसाल गावाच्या (१ किमी) अगोदर ओवळीचे फाटा उजव्याबाजूस आहे. तेथून ओवळीये २ किमी वर आहे.
 ३) मालवण - कसाल किंवा कणकवली - कसाल बससेवा आहे. कसालहून ओवळीयेला जाण्यासाठी ठराविक वेळेतच बसेस आहेत. म्हणून कसालहून जाण्या येण्याकरीता रिक्षा ठरवून गडावर जावे.

      आपण ओवळीये गावातून सिध्दगडाची चढाई करु.ओवळीये गावातील शाळेच्या ओसरीवर १० जणांची रहायची सोय होऊ शकते.गडावर जेवणाची सोय नाही, ३ किमी वरील कसाल गावात होऊ शकेल.तेव्हा पॅक लंच घेउन निघायचे,ओवळीये गावातून मालवणच्या दिशेन दोन मिनीटे चालायचे. ग्रामपंचायतीजवळ रामेश्वर मंदिर आहे ,जवळच दगडी क्रशरची साईट आहे.इथून सिध्दगड ज्या पठाराला लागून आहे तिकडे पोहोचणारा लाल मातीचा कच्चा रस्ता असून अर्धा तासात सडा गाठातो.रस्ता कच्चा असल्याने पावसाळ्यात वाहन नेता येणार नाही.सड्यावर पोहचलो कि सड्यावर वसलेली सिध्दवाडी दिसते.इथे थोडी झाडी व मागे वॉच टॉवर दिसतो.त्या दिशेने निघायचे. सिद्धगड पश्चिमेला निमुळता होत गेलेला टोकावर सिद्धगड उभा असून वाडीतून १५ / २० मिनिटाच्या अंतरावर सिद्धगड वर येउन पोहचतो.पठारावरून दिसणाऱ्या दाट झाडीत निमुळत्या होत जाणाऱ्या डोंगरावर सिद्धगडाचे बांधकाम केले आहे. दाट झाडीमुळे पटकन गड ओळखू येत नाही
दहा मिनिटात आपण बुजत आलेल्या खंदकाजवळ पोहचतो. हा खंदक ओलांडला कि गडाच्या नष्ट झालेल्या दरवाज्याशेजारील तटबंदी दिसते. आपण आल्याची कोणी वर्दी देणार नसेल यातून गडात प्रवेश करायचा. उजव्या हाताचा परिसर दाट झाडीने व्यापला आहे.वाट डावीकडे वळत जाते.या झाडीत रानडुकरांचा वावर आहे.
उजवीकडे  एक चौथरा तसेच डावीकडे तटाजवळ चौथरा आणि त्यापुढे वाड्याचे जोते दिसते.
तटाकडेने वाटचाल सुरुच ठेवायची.पुढे एक मोठी बावडी ( विहीर ) दिसते.पन्नास फुट लांब व वीस फुट खोल अशा या जांभ्या दगडाच्या विहीरीत आत वाढलेल्या झाडांनी भिंतीना भेगा पडल्या आहेत.अर्थातच पाणी नाही.त्यामुळे गडावर येताना आपण पाणी आणणे आवश्यक आहे. विहीराला लागून भिंत आहे.थोडं पुढे जाताच चार खांब आणि मध्ये एक घुमटी नजरेस पड. हि भैरोबाची घुमटी! हेच सिध्दाचे देउळ ( चांभराई ) आहे.
   तटाच्या कडेने तसेच चालत निघाल्यावर डाव्या हाताला खंदल दिसतो.हे खंदक शत्रु थेट तटबंदीला भिडू नये म्हणून बांधण्यात आले.मात्र यात पाणी साठत नाही.पुढे गेल्यावर गडाच्या टोकाला दाट झाडी असल्यामुळे टोकावर जाता येत नाही.उजवीकडे वळुन परतीचा मार्ग पकडल्यावर पुढे तटबंदी आणि बुरुज दिसतात.कातळकड्याचा वापर तटासाठी केला आहे.तटाखाली नैसर्गिक दरी असल्याने ईथे तटबंदी नाही.यबाजुला देखील दाट झाडी वाढल्याने गडाच्या टोकाशी जाता येत नाही.इथेच या गडाची फेरी संपते.लांबुडक्या आकाराच्या सिध्दगडाचा माथा जेमतेम असल्याने गडदर्शनास फार वेळ जात नाही.
     अर्थात फक्त सिध्दगड बघाण्यासाठी या परिसरात येण्यापेक्षा या परिसरातील ईतर गडही एकाच भेटीत पहाता येतील. मालवणहून सकाळी निघून (१२ किमी) मसूरे जवळील भरतगड व भगवंतगड पाहून (१७ किमी) रामगडला जाता येते. तसेच रामगडहून ओवळीये गावातील (१० किमी) सिध्दगड पाहून कसाल मार्गे (३६ किमी) मालवणला येता येते. या मार्गाने हे ४ किल्ले एका दिवसात पाहून होतात.
हिवाळे सडा :- 
  ओवळीयेनजीकच्या सिध्दगडाला गेल्यावर न चुकता बघण्यासारखे आणखी एक ठिकाण म्हणजे 'हिवाळे सडा'. एकीकडे निसर्गसौंदर्याचा वरदहस्त लाभलेल्या सिंधुदुर्गात आता अतिप्राचिन असलेल्या कातळशिल्पांच्या खजिन्याची दिवसेंदिवस भर पडत आहे. रत्नागिरीपासून गोव्यापर्यंतच्या परिसरातील ही कातळशिल्पे कधी खणली? कोणी खणली? का खणली? कशासाठी खणली? हा कुतूहलाचा विषय आहे. अनेक ठिकाणी ही कातळशिल्पे स्थानिक लोकांनी पांडवांशी जोडली आहेत. ‘पांडवांचो सारीपाट’, ‘लिवलेला काप’, ‘महापुरुष’ अशा वेगवेगळ्या नावांनी ही कातळशिल्पे ओळखली जातात. खरे तर ही कातळशिल्पे नसून रेखाचित्रे आहेत. ही कातळचित्रे मानवाला शिल्प घडविता येण्यापूर्वीची प्राथमिक पायरी असली पाहिजे. त्यामुळे ही कातळचित्रे काही हजार वर्षांपूर्वीची असू शकतात. कोकण किनारपट्टीला विस्तीर्ण समुद्रकिनारा लाभला आहे. या किनार्‍यावर सह्याद्री पर्वताच्या रांगा आहेत. लक्षावधी वर्षांपूर्वी भूखंडांचे स्थलांतरण, भूकंप व ज्वालामुखीचे उद्रेक यातून या पर्वतरांगा तयार झालेल्या आहेत. या सह्याद्री पर्वतांच्या माथ्यावर ज्वालामुखीतील लाव्हा रसाचे थरावर थर पसरून ‘लॅटराइट’ या प्रकारच्या जांभ्या दगडाचे सपाट पठार तयार झालेले आहे. लॅटराइटने बनलेल्या या सपाट कातळी भागालाच कोकणात ‘सडा’ असे म्हटले जाते. ज्या गावाच्या शेजारी हे पठार असेल, ते त्या गावाच्या नावाने ओळखले जाते - उदा., जामसंडे सडा, दाभोळे सडा, कुणकेश्वर सडा इत्यादी. या भागातील पठारांची नावे अशीच पडलेली पाहायला मिळतात. या परिसरात घरांच्या बांधकामांसाठीदेखील याच जांभ्या कातळातील चिरे कातून काढून वापरले जातात. हा कातळ तासून काढायला अतिशय कठीण व कष्टदायक असतो. हा लॅटराइटचा जांभा दगड काही ठिकाणी अत्यंत कडक जांभळट, काळ्या रंगाचा असलेला आढळतो. वरच्या थराचा हा भाग अत्यंत कठीण थरांचा बनलेला असतो आणि अशा प्रकारच्या कठीण भागावरील सपाटीलाच अनेकदा कोरून तासून तयार केलेली कातळशिल्पे आढळतात. यांना पुरातत्त्वीय भाषेत ‘पेट्रोग्लिफ्स’ असे म्हणतात. या प्रकारची कातळशिल्पे आता रत्नागिरी-राजापूरपासून पार गोव्यापर्यंतच्या सर्वच दक्षिण कोकणात सापडू लागली आहेत.

1990 साली डॉ. दाऊद दळवी यांनी रत्नागिरी येथील निवळे फाट्यावरील कातळशिल्पे उजेडात आणली. ही कातळशिल्पे भौमितिक आणि अमूर्त रचनांसाठी प्रसिद्ध आहेत. लांबून पाहताना एकाद्या इलेक्ट्रिक सर्किटसारखी ही रचना दिसते. कोकणात अशी काही कातळशिल्पे असल्याचा हा पहिलाच उल्लेख आढळतो. प्र.के. घाणेकर यांनीही ‘कोकण पर्यटन’ या पुस्तकात कातळशिल्पांचा उल्लेख केलेला आढळतो. 1996-97 साली पालशेत भागात आर्किऑलॉजीचे काम सुरू असताना त्याच्या आसपासच्या भागातील कातळशिल्पे या टीमच्या पाहण्यात आली. त्या वेळी या रत्नागिरी-राजापूर परिसरातील कातळशिल्पांचे सर्वेक्षण करण्यात आले होते. या टीममध्ये सामिल असणार्‍यास श्रीकांत प्रधान यांनी रीतसर काम सुरू केले. त्यांनी त्याचे फोटोग्राफ्स, उत्कृष्ट रेखाचित्रे तयार केली. स्थानिक लोकसंस्कृतीचा या शिल्पांशी काही संबंध आहे का, याचा शोध घेण्याचा त्यांनी प्रयत्न केला. या कातळशिल्पावर त्यांनी शोधनिबंधही सादर केले आहेत.
   त्यानंतर 2000 साली रवींद्र लाड यांनी बारसू, देवीहसोळ, सोलगाव, गावडेवाडी या भागातील कातळशिल्पे शोधून काढली. बारसू या गावातील कातळशिल्प तर इतके मोठे आहे की त्याचे फोटो काढण्यासाठी ड्रोन कॅमेराच पाहिजे. जमिनीवरून त्याचे नीट फोटो काढताच येणार नाहीत, इतके ते शिल्प मोठे आहे. यात एक मोठी विशाल मानवाकृती असून तिने दोन हातांनी दोन वाघ रोखून धरले आहेत, असे विलक्षण दृश्य या शिल्पात पाहावयास मिळते. जगातील अनेक प्राचीन संस्कृतींमध्ये या प्रकारचे चित्रणे आढळली आहेत. सिंधू संस्कृतीतील एका मुद्रेवरदेखील असेच चित्र पाहायला मिळते. त्यामुळे या कातळशिल्पांचा प्रवास सिंधू संस्कृतीपासून सुरू झालाय का? असा एक प्रश्न लाड यांनी उपस्थित केला आहे.



    त्यानंतरच्या काळात मालवण येथील जनसंपर्क अधिकारी सतीश लळीत यांनी हिवाळे, कुडोपी येथील कातळशिल्पे उजेडात आणली. हिवाळे येथील कातळशिल्पांना स्थानिक लोक ‘पांडवांची चित्रे’ या नावाने ओळखत असत. कुडोपी गावाजवळ ‘बावल्यांचे टेंब’ या नावाने ओळखल्या जाणार्‍या पठारावर सुमारे साठहून अधिक कातळशिल्पे असल्याची नोंद त्यांनी केली आहे. या शिल्पांचे महत्त्व ओळखून त्यांनी यावर आपला शोधनिबंध ‘रॉक आर्ट सोसायटी ऑफ इंडिया’च्या 2012 साली झालेल्या 17व्या राष्ट्रीय काँग्रेसमध्ये सादर केला होता. त्यामुळे हा विषय जागतिक पातळीवर गेला. ‘ही कातळशिल्पे अतिशय भव्य व प्रेक्षणीय आहेत. वैविध्य, रचना, कलाकारी, सौदर्य, प्रमाणबद्धता या दृष्टीने ही कातळशिल्पे अतुलनीय आहेत. हे स्थळ आंतरराष्ट्रीय दर्जाचे असून त्याचे नीट जतन होणे आवश्यक आहे. या कातळशिल्पांचा दर्जा पाहता त्या काळात या परिसरात वास्तव्य करणारा मानवी समूह अतिशय प्रगल्भ असला पाहिजे’ असा अभिप्राय प्रसिद्ध पुरातत्त्वज्ञ डॉ. सुंदरा अडिगा यांनी या परिषदेत व्यक्त केला होता.
   अलीकडेच मालवण तालुक्यातल्या असरोंडी हायस्कुलचे शिक्षक कमलेश गोसावी यांनी हेदूळ आणि ओवळीये गावाच्या परिसरात तब्ब्ल १७ कातळशिल्प शोधून काढली. गोसावी यांनी  शाळेतल्या अध्ययनाव्यतिरिक्त विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष क्षेत्रभेट उपक्रमाच आयोजन केल. त्यानुसार त्यांनी एका रविवारी हेदूळ आणि ओवळीये गावच्या परिसरातल्या कातळशिल्पांचा शोध सुरू केला. यामध्ये आपटय़ाचा कातळ परिसरात ११ कातळशिल्प आढळली असून यातली सहा शिल्पे सुस्थितीत आहेत. तर ओवळिये धनगरवाडीनजीक सहा कातळशिल्प आढळली असून यातीलही काही सुस्थितीत आहेत. विशेष म्हणजे या दोन्ही ठिकाणी अश्मयुगीन मानवाच्या हत्यारांचे अवशेषही सापडले आहेत. एकंदरीतच कोकणातल्या मानव संस्कृतीचा अभ्यास करण्याच्या दृष्टीनं हि कातळशिल्प उपयोगी असून त्यांचा अभ्यास होणं आवश्यक आहे. 
संदर्भग्रंथः-
१) गड्,किल्ले सिंधुदुर्ग जिल्ह्यातील- सतिश अक्कलकोट
२) www.durgbharari.com   हि वेबसाईट
३) डोंगरयात्रा-आनंद पाळंदे
४) महाराष्ट्र देशातील किल्ले-चिंतामण गोगटे
५) www.trekshitiz.com  हि वेबसाईट








भैरवगड-नरडवे

भैरव हे जनमानसात रुळलेले शिवाचे एक रूप. सामान्य जनमानसात लोकप्रिय असलेल्या या देवतेची केवळ मंदीरे बांधून पूजा केली गेली नाही तर अनेक डोंगरांना व किल्ल्यांना या देवतेचे नाव दिले गेले आणि याचमुळे आपल्याला महाराष्ट्रात भैरवगड नावाचे एक दोन नव्हे तर तब्बल सहा दुर्ग आढळतात. एक आहे माळशेज घाटातील डाईकवर उभारलेला भैरवगड उर्फ सारंगगड्,दुसरा हरिश्चंद्र-रतनगड परिसरातील आंबितजवळचा भैरवगड, तिसरा कोयनेच्या जंगलाची वन्यभ्रमंती घडवून आणणारा भैरवगड आणि चौथा या सर्वांच्या तुलनेत अप्रसिध्द आणि अगदी अस्सल दुर्गभटक्यांनाही अपरिचीत असणारा कणकवली घाटाजवळचा भैरवगड.याशिवाय विदर्भातील वारी भैरवगड आणि ठाणे जिल्हयात उत्तर कोकणातील भैरवगड आहे.
आज याच उपेक्षित दुर्गाची आपण ओळख करुन घेणार आहोत.
    आधीच अप्रसिध्द असणार्‍या या गडावर जाणेही तितके सोपे नाही. नरडवे हे या किल्ल्याजवळील मोठे गाव असल्याने हा नरडवेचा भैरवगड म्हणुन ओळखला जात असला तरी गडावर जाण्याच्या वाटा दिगवळे रांजणवाडी आणि नरडवे भेर्देवाडी येथुन आहेत. कणकवली बस स्थानकातून दिगवळे रांजणवाडी येथे जाण्यासाठी बसची फारशी सोय नसल्याने नरडवे भेर्देवाडी येथुन गडावर जाणे व रांजणवाडी येथे उतरणे जास्त सोयीचे आहे. कणकवली ते नरडवे अंतर २६ कि.मी.असुन भेर्देवाडी तेथुन ३ कि.मी.अंतरावर आहे. रांजणवाडीत दिवसभरात ४ एस.टी बस येतात अन्यथा खाजगी रिक्षाने कनेडी गाव व तेथुन कणकवलीला जाता येते. राजंणवाडी गडाच्या उत्तर बाजुला असून भेर्देवाडी गडाच्या दक्षिण बाजुला आहे. उत्तर पायथ्याच्या राजंणवाडीमुळे याला 'राजंणगड' असे म्हणले जात असले तरी भैरवगड हेच जास्त प्रचलित नाव आहे.
      गडाच्या दोन्ही बाजूने चढणार्‍या वाटांची आपण माहिती घेउया.सर्वप्रथम दक्षिणेच्या भेर्देवाडीच्या वाटेची माहिती घेउया. भेर्देवाडी गावात शिरण्याआधी मुख्य रस्त्याला लागुनच डावीकडे एक पायवाट गडाच्या डोंगरावर जाते. गावकऱ्यांचे गडावरील भैरवनाथ मंदिरात सतत ये-जा असल्याने वाट चांगलीच मळलेली असुन कोठेही चुकण्याची शक्यता नाही. शिवाय लाकुड गोळा करण्यासाठी आलेल्या आणि गुरे चारणार्‍या गावकर्‍यांची वर्दळ अस्ल्याने वाट चुकण्याची शक्यता नाही. 
गडाची सोंड वगळता संपुर्ण वाटेवर जंगल असल्याने फारसे उनही जाणवत नाही. गडावरील पाण्याचे ठिकाण सहजपणे सापडत नसल्याने पुरेसे पाणी सोबत घेऊनच चढाईला सुरवात करावी. पायथ्यापासुन साधारण तासाभरात आपण गडाच्या सोंडेवर पोहोचतो. 

या वाटेवर काही ठिकाणी लोखंडी कठडे बांधले आहेत. सोंडेवरून गडासमोरच्या माचीवर पोहोचण्यास २० मिनीटे लागतात पण हा चढ चांगलाच थकवतो. वाटेच्या शेवटच्या टप्प्यात दगडी पायऱ्या बांधलेल्या असुन सुरक्षेसाठी लोखंडी कठडे उभारले आहेत. 
गडासमोरील माचीवर थोडीफार सपाटी असुन या ठिकाणी एखादी चौकी असावी. माचीवरून सोनगड व गड नदीचे संपुर्ण पात्र नजरेस पडते. समुद्रसपाटीपासुन २१६० फुट उंचावर असलेला गडाचा डोंगर दक्षिणोत्तर पसरलेला असुन सह्याद्रीच्या मुख्य रांगेपासून सुटावलेला हा डोंगर एका लहान डोंगरधारेने सह्याद्रीशी जोडला गेला आहे. गडाचा परीसर ६-७ एकरमध्ये सामावलेला असावा. माचीवरून पाच मिनिटे चालत पुढे गेल्यावर आपण गडाच्या उध्वस्त तटबंदीत पोहोचतो. 
गडाला माचीपासुन वेगळे करण्यासाठी तटाबाहेर खंदक खोदलेला असुन तटबंदीचे दगड या खंदकात कोसळलेले आहेत. या तटबंदीत एक बुरुज असुन बुरुजाच्या मध्यभागी असलेला तोफेचा चौथरा व बुरुजातील मारगीरीच्या जंग्या पहायला मिळतात. या ठिकाणी गडाचा दरवाजा असावा पण सध्या त्याचे कोणतेही अवशेष दिसुन येत नाही.
 येथुन पुढे जाताना वाटेच्या डाव्या बाजुस असलेल्या उंचवट्यावर चौथऱ्याचे अवशेष दिसुन येतात. चौथऱ्याच्या पुढील भागात सपाटीवर काही घराचे अवशेष आहेत. 
येथुन पुढे आपण गडावरील मुख्य वास्तु असलेल्या भैरवनाथाच्या मंदिरात पोहोचतो. जुन्या मंदिराच्या पायावर नव्याने उभारलेल्या या मंदिराची मुळ रचना कायम ठेवण्यात आली असुन त्यावर चौखापी कौलारू छप्पर आहे. 

मंदिरात लाकडी गाभारा असुन त्यात तीन देवता तांदळा स्वरुपात विराजमान आहेत. मंदिराबाहेर एका चौथऱ्यावर जांभ्या दगडात बांधलेली १२ फुट उंचीची दीपमाळ असुन ४ फुट लांबीच्या २ तोफा स्टीलच्या गाड्यावर ठेवलेल्या आहेत. 
दिपमाळेच्या चौथऱ्यावर दगडी वृंदावन व काही कोरीव अवशेष ठेवलेले आहेत. 
दीपमाळेच्या बाजुला अर्धा फुटाहून जास्त व्यासाचा वाटोळा दगड असून तो बारा माणसांनी एक बोट लावले तर उचलला जातो. मंदिरात जेवणासाठी लागणारी सर्व प्रकारची भांडी मोठ्या प्रमाणात असुन गडावर मुक्काम करण्यासाठी हे सुंदर ठिकाण आहे. पाण्याची सोय मात्र थोडी अडचणीची आहे. गडावरचा हा भैरव इथल्या पंचक्रोशीत प्रसिध्द आहे.फेब्रुवारी-मार्च मध्ये ईथे जत्रा भरते.त्यावेळी इथे गावकरी जमतात.याला स्थानिक लोक 'जय भैरी ब्राम्हणदेव' म्हणतात.जत्रेच्या दिवशी अवसर स्वारी इथे देवभेट घेते.यावेळी देवाला बळी दिला जातो. मंदिरात जेवण बनवता यावे यासाठी भांडी ठेवली आहेत.कदम नावाचे लोक येथील गडकरी असून त्यांची गड पायथ्याला वस्ती आहे.मंदिराजवळ असलेल्या औदुंबराच्या झाडाखाली बसून सिंधुदुर्ग जिल्ह्याचा बराचसा उत्तर भाग दृष्टीस पडतो.
मंदिराच्या मागील बाजुस खाली उतरत जाणाऱ्या वाटेवर पाण्याचे टाके असुन या टाक्यात मार्च महिन्यापर्यंत पाणी असते. भैरवनाथाचे दर्शन घेऊन आपण आपल्या पुढील गडफेरीस सुरवात करायची. 
दिपमाळेच्या पुढील भागात एक उध्वस्त चौथरा असुन या चौथऱ्यावर लहान हनुमान मुर्ती आहे. हि मुर्ती अलीकडील काळातील असावी. मंदिराकडील वाटेने पुढे निघाल्यावर डावीकडे झाडीत एक मोठा चौथरा व उध्वस्त बांधकाम पहायला मिळते. या ठिकाणी किल्लेदाराचा वाडा अथवा गडाची सदर असावी. येथुन वाटेतील २-३ उध्वस्त चौथरे पहात पुढे गेल्यावर आपण गडाच्या उत्तर दिशेला असलेल्या उध्वस्त तटबंदीजवळ पोहोचतो. या ठिकाणी एक मोठा बुरुज असुन त्यावर मोठमोठी झाडे वाढलेली आहेत. या ठिकाणी कधीकाळी दरवाजा असल्याच्या खुणा ठळकपणे जाणवतात.
 पायऱ्यांची हि वाट तटबंदीला वळसा घालत खाली असलेल्या सोंडेवर उतरत जाते. हि सोंड सह्याद्रीच्या डोंगररांगाना भिडली आहे. या ठिकाणी आपली एक तासाची गडफेरी पुर्ण होते. येथुन आल्यामार्गे परत फिरावे 

गडावरुन नैऋत्येला सोनगड त्याच्या कातळमाथ्यामुळे आणि त्यावर असणार्‍या असिताष्म स्तंभामुळे सहज ओळखता येतो. पायथ्याची नरडवे,दिगवळे हि गाव दिसतात.गड नदीचे पात्र हि सुंदर दिसते.
         भेर्देवाडीच्या वाटेप्रमाणेच राजंणवाडीतून चढणारी वाटही निसर्गरम्य आहे.दिगवळे गावानंतर राजंणवाडी येते.गावातून एखादा वाटाड्या घेतल्यास तो गर्द जंगलाच्या वाटेवरील वन्यखुणा दाखवू शकतो.
 या वाटेच्या तळातील भागात १००-१५० सिमेंटच्या पायऱ्या बांधलेल्या आहेत. जंगली प्राण्यांच्या पाउलखुणा आणि झाडावर अंग घासलेल्या जागा बघत आपण गड केव्हा चढून येतो हे समजत नाही.या गडाच्या आसपासचा घनदाट जंगल पाहता हा केवळ गिरीदुर्गच नाही तर वनदुर्ग देखील आहे.अर्धी चढण चढून आल्यावर खडकाळ परिसर लागतो.इथे एका खडकावर वाघाशी साम्य असलेले पांढर्‍या रंगातील चित्र दिसते.गावकरी याला 'वाघचित्र' असेच म्हणतात.यानंतर अरुंद पाउलवाटेने वर चढायचे.वाटेत मार्गेश्वराचे स्थान लागते.ईथे झाडाचे पान अथवा फुल अर्पण करायचे अशी प्रथा आहे.योग्य मोसमात आल्यास वाटेत असणार्‍या रान आवळ्याची मजा घेत आपण साधारण दीड ते दोन तासात गडमाथ्यावर पोहचतो. गडावरच्या मंदिरापाशी जाण्याआधी वाघिणीचे पाणी नावाचा वर्षभर वहाणारा झरा दिसतो.हा जंगलातील प्राण्यांचा पाणवठा आहे.इथले पाणी थंडगार आहे,मात्र हे पाणी अस्वच्छ असल्याने गाळून घेणे योग्य होईल.अशाप्रकारे आपण गडमाथ्यावर पोहचतो.
          या गडाची उभारणी नेमकी कधी झाली हे आज तरी अज्ञात आहे.बहुधा कोकणातून होणार्‍या व्यापारावर नियंत्रण ठेवण्यासाठी चालुक्य किंवा शिलाहार राजवटीत गडांची उभारणी झाली असावी. या परिसरातून घोटगे,वर्‍हाडाची पाज आणि भैरवगड अशा तीन घाटवाटा देशावर चढतात. शिवकाळात या गडाचा उल्लेख येत नाही.फोंड सावंत (१७०९-३८ ) हा किल्ला बांधल्याचे सांगीतले जाते पण त्याला कागदोपत्री आधार नाही. आलमगिरी वावटळीनंतर मराठा साम्राज्याचे दोन भाग झाले.यात करवीर संस्थानात या भैरवगडाचा समावेश होत होता.   करवीरकर व सावंतवाडीकर यांच्या सततच्या कुरबुरीत सावंत नेहमी भैरवगड व सोनगड या किल्ल्यास उपद्रव करत पण एप्रिल १७८२ मध्ये रांगण्याचा वेढा उठवल्यावर सावंतानी या किल्ल्यास उपद्रव होणार नाही असे वचन दिले. सन १८२२ मध्ये सोनगड व भैरवगड या किल्ल्यांचा तनख्याचा निकाल ब्रिटीश सरकारने करवीरकरांच्या बाजूने दिला. इ.स.१८४२ आबाजी सदाशिव गडाचे सबनीस तर मुंजाजी जाधव यांची किल्लेदार म्हणुन नेमणुक होती. यानंतरच्या काळात गडाची कोठेही नोंद दिसुन येत नाही. इ.स.  १८५० मध्ये सोनगड उर्फ नरसिंहगडाचा उल्लेख मिळतो परंतु भैरवगडाचा उल्लेख येत नाही. सन १८६२च्या पहाणीत या गडावरील सर्व अवशेष नष्ट झाल्याचे नोंदले आहे म्हणजे १८४४ मधील करवीर मधील गडकऱ्यांच्या उठावात इंग्रजांनी बहुदा या किल्ल्यावरील वास्तुची तोडफोड केली असावी.
    एकंदरीत या गडाचे आडवाटेवरचे स्थान बघता फक्त भैरवगड पहायला येण्यापेक्षा भैरवगड पाहून सोनगड तिथून वेळ असल्यास घोटग्याच्या वाटेने देशावर जाउन सिध्दाचा डोंगर पाहून पुढे रांगणा व शक्य असल्यास त्याला जोडून मनोहर-मनसंतोषगड पहाता येतील.
   भैरवगड माहिती संपर्क  098218 49823
स्थानिक संपर्क क्रमांक- 9422636858
संदर्भग्रंथः-
१) गड्,किल्ले सिंधुदुर्ग जिल्ह्यातील- सतिश अक्कलकोट
२) www.durgbharari.com   हि वेबसाईट
३) डोंगरयात्रा-आनंद पाळंदे
४) सांगाती सह्याद्रीचा- यंग झिंगारो ट्रेकर्स





























 प्रकार : गिरीदुर्ग

जिल्हा : सिंधुदुर्ग

उंची : २१६० फुट

श्रेणी : मध्यम



 






















 


सोनगड उर्फ नरसिंहगड उर्फ नृसिंहगड

    कुडाळ परिसरातील गड्,कोट म्हणले कि बहुतेकांना थोडाफार रांगणा उर्फ प्रसिध्दगडाची ओळख असते.वास्तविक रांगणा हा भौगोलिक दृष्ट्या कोल्हापुर जिल्ह्यात येतो.मात्र या बलदंड किल्ल्याला दक्षिण बाजुला मनोहर आणि मनसंतोषगड हे दोन तर उत्तर बाजुला सोनगड व भैरवगड असे दोन पहारेकरी आहेत.हि दुर्गचौकडी मात्र सिंधुदुर्ग जिल्ह्यात मोडते.यातील सोनगड उर्फ नरसिंहगडाची आज आपण ओळख करुन घेणार आहोत. 
       सिंधुदुर्ग जिल्ह्यात तब्बल २३ किल्ले आहेत्,यावर कदाचित विश्वास बसणार नाही, पण बहुतेकांना सागरी दुर्ग माहिती असतात.सिंधुदुर्गला तर पर्यटकांची जत्रा असते.मात्र याच जिल्ह्याची पुर्व सीमा सह्याद्रीच्या द्क्षिण-उत्तर दिशेने धावणार्‍या रांगेने आखली आहे.या सह्याद्रीच्या मुख्य रांगेत भैरवगड,सोनगड्,मनोहरगड्,मनसंतोषगड्,महादेवगड्,नारायणगड आणि हनुमानगड आहेत. या बहुतेक दुर्गांना फार एतिहासिक संदर्भ नाहीत. सोनगडाचे थोडे एतिहासिक संदर्भ समजून घेउया आणि मग प्रत्यक्ष गडफेरी करुया.
  या गडाची उभारणी नेमकी कोणी केली याबध्दल इतिहास मुग्ध आहे. शिवकाळात या गडाचा उल्लेख येत नसला तरी परिसरातील नरडवे व घोटगे घाट पहाता या घाटांच्या टेहळणीसाठी हा दुर्ग पुर्वीपासून अस्तित्वात असावा. फोंड सावंत (१७०९-३८ ) हा किल्ला बांधल्याचे सांगीतले जाते पण त्याला कागदोपत्री आधार नसुन त्यांनी या किल्ल्याची दुरुस्ती केली असावी. ५ ऑगस्ट १७०० मधील एका नोंदीनुसार पाटगावचे जनार्दन भट यांना घोटगे घाटातून होणाऱ्या माल वाहतुकीवर जकातीचे काही अधिकार देण्यात आले होते. याचा अर्थ हा घाट आधीपासुनच वापरात होता. १८ व्या शतकात छत्रपतींचे सरदार सावंतवाडीकरांच्या ताब्यात सोनगड होता.पण त्याकाळच्या पत्रात या गडाचा उल्लेख नरसिंहगड असाच येतो.सावंताना छत्रपतींचे अधिपत्य मान्य नव्हते. करवीरकर व सावंतवाडीकर यांच्या सततच्या कुरबुरीत सावंत नेहमी भैरवगड व सोनगड या किल्ल्यास उपद्रव करत पण एप्रिल १७८२ मध्ये रांगण्याचा वेढा उठवल्यावर सावंतानी या किल्ल्यास उपद्रव होणार नाही असे वचन दिले. सन १७८७ मध्ये वाडीकर सावंतानी बादशहाकडून स्वतःसाठी मोर्चेल आणले. करवीरकरांना हे मान्य झाले नाही व त्यांचे नेसरीचे सरदार नरसिंहराव शिंदे व यशवंतराव सहीने यांनी सावंताच्या ताब्यातील सोनगडावर हल्ला करून तो ताब्यात घेतला याच उल्लेख २ जानेवारी १७८८ मधील एका पत्रात येतो. "स्वारी पालेच्या हुड्यावर राहून नरसिंहगड किल्ला सावंताच्या यासी मोर्चे लागू केले". पुढे सावंत व करवीरकर यांच्यात समेट झाला व ५ नोव्हेंबर १७९३ रोजी गड सावंतांना परत करण्यात आला. एप्रिल १७९५ मध्ये सावंतानी धोंडो लेले यास किल्लेदार नेमले. तो उल्लेख असा "राजे खेम सावंत भोसलेंनी किले नरसिंहगडची किल्लेदारी धोंडो लक्ष्मण लेले यांस सांगोन किलेस रवाना केले आहेत.तर मशारनिलेस पन्नास लोकांनिशी व शागीर्द पेक्षा व कारकुन आसामी दहा येकून आसामी साठ किलेस येउन किलेचा पेक्षा व कारकुन आसामी दहा येकून आसामी साठ किलेत घेउन किलेचा बंदोबस्त चौकीपहारेचा करणे व मारबिलेही करतील व किलेत परवानगी रसवानगी लेले मशारनिले याची त्यास त्याचे रजेतलबेत वर्तणुक करणे".
सावंतांच्या गृहकलहात सन १८०५ मध्ये फोंड सावंताच्या विनंतीवरुन करवीरकरांनी सावंताच्या मुलुखावर स्वारी केली. रांगण्याचा किल्लेदार राणोजी निंबाळकर यांनी करवीरकरांच्या वतीने सोनगड किल्ल्याचा ताबा घेतला व सखाराम जाधव यांस किल्लेदार नेमले.  मात्र करवीरकरांनी फितुरीने किल्ला ताब्यात घेउन जागोजागी चौक्या बसवून लुटालुट करु लागले, असा आरोप सावंतानी केला.यानंतर किल्ला करवीरकरांच्याच ताब्यात राहिला.
 ९ नोव्हेंबर १८१७ मधील एका पत्रात किल्लेदार सखाराम जाधव सावंत व पोर्तुगीज यांच्या लष्करी हालचालीबद्दल लिहीताना अमात्यांना किल्ल्याचा बंदोबस्त चोख असल्याचे कळवतात. या सर्व कागदपत्रात या किल्ल्याचा उल्लेख नरसिंहगड या नावाने येतो. २४ मे १८०८ रोजी नारायणराव पाटणकर सरलष्कर यांना केलेल्या आज्ञेनुसार सोनगड येथे सखाराम शंकर यास १०० रुपये दर सालीना वेतनवर ठेवले होते.सन १८१७ मध्ये सावंत व पोर्तुगीज यांच्या वाढत्या लष्करी हालचाली संबधी बावड्याच्या आमात्यांना माहिती देताना किल्लेदार सखाराम जाधवांनी ९ नोव्हेंबर १८१७ रोजी असे लिहीले "किल्ल्याचे वर्तमान व्यवस्थित असे चौकी पहारेची व घाट वाटेचा बंदोबस्त करुन लोक पाळी गैरपाळीचे गडकरी व नामजद जमउन रात्रंदिवस हुशारीने आहो".
   सन १८१८ मध्ये इंग्रजांचा वरवंटा पुर्ण सह्याद्रीत फिरला.त्यात इंग्रजांनी नुसते गड घेतले नाहीत तर या गडांचा उपयोग करुन बंड होउ नये म्हणून त्यांची नासधुस केली,तिथे जाणार्‍या वाटा मोडल्या.मात्र करवीर संस्थानाने आधीच ईंग्रजांचे वर्चस्व मान्य केल्याने इंग्रजांनी करवीरकर संस्थानातील गड ताब्यात घेतले तरी त्यांची नासधूस केली नाही. सोनगड उर्फ नरसिंहगडावर १८१८ नंतरही राबता होता.
 सोनगड्,रांगणा व भैरवगडाच्या माणगाव व नारुर तर्फात ५३ गावांच्या वसुलीवरुन सावंत व करवीरकर यांच्यात तंटा होता. हा वाद ईंग्रजांपुढे नेण्यात आला. सन १८२० मध्ये करवीरकर त्यावर मांडलेले मत असे, "किले सोनगडाच्या तनखेत वाडीकर उपद्रव करितात.त्यास ताकीद होउन सावंत याचा उपद्रव न होता किलेचा तनखा किलेकडे चालावा". गावातून गोळा होणार्‍या सार्‍यावर सोनगड व रांगण्याच्या शिबंदीचा व इतर खर्च चालतो. त्यामुळे हा महसुल मिळावा हि दोन्ही पक्षांची मागणी होती. सावंतांचा दावा होता कि हा प्रदेश पुर्वापार त्यांच्या जहागिरीचा असल्यामुळे हा महसुल त्यांनाच मिळाला पाहीजे. या वसुलीच्या भांडणात सन १८२२ मध्ये सोनगड व भैरवगड या किल्ल्यांचा तनख्याचा निकाल ब्रिटीश सरकारच्या वतीने रत्नागिरीचा कलेक्टर रिड याने दोघांची बाजु एकून करवीरकरांच्या बाजूने दिला. यामुळे दरसाल सावंताना करवीरकरांना ७८२४  रुपये द्यावे लागले.
  डिसेंबर १६३४ च्या पत्रानुसार सोनगड्,मनोहरगडाचे गडकरी करवीर छत्रपतींसमोर आपली कैफीयत मांडायला आले होते "सोनगड गडाकरी लोक बंद तंटा चालविले होते.अलीकडे तेथील मामलेदार बाबासाहेब सरनौबत याचे मार्फतीने गडकरी लोकांचे बोलणे चालणे होउन गडकरी लोक कोल्हापुरास महाराज साहेबापासी आले आहेत. महाराजांनी त्यांचे समाधान केले".इ.स.१८४२ मध्ये केसो आबाजी गडाचे सबनीस होते. सन १८४४ मधील करवीर मधील गडकऱ्यांच्या उठावानंतर इंग्रजांनी करवीर इलाख्यातील गडांची पाडापाडी केली.मात्र १८५० पर्यंत नरसिंहगड नांदत होता, कारण १८५० मध्ये इंग्रज सरकारमधून गडाच्या तनख्याच्या थैल्या हुजूर आल्याचे उल्लेख येतात.
     अत्यंत अनवट आणि अस्सल दुर्गभटक्यांच्या यादीत नसलेल्या या गडाची आता ओळख करुन घेउया. सोनगड हा कुडाळ तालुक्यात येत असला तरी ईथे जाणे कणकवलीकडून सोयीचे आहे.
  या गडावर जाण्यासाठी दोन मार्ग आहेत.
१) फोंडाघाट-कणकवली-हलावल-पिंपळवाडी-जांभवडे-सोनवडे-घोटगे-दुर्गानगर-पवारवाडी. सोनगड किल्ल्याच्या पायथ्याशी ‘दुर्गानगर’ ,त्याच्या ‘पवारवाडी’ वस्तीतून सोनगडावर जाण्यासाठी थेट वाट आहे. मात्र सध्या ‘गड’ नदीवर नव्यानेच धरण बांधण्याचे काम सुरु असल्याने नरडवे गावानंतर पवारवाडी पर्यंत ७ किमीचा कच्चा मातीचा रस्ता आहे.
२) कणकवली – वागदे – कसाल – घोटगे – सोनवडेमार्गे गडपायथ्याची पवारवाडी गाठायची. या पर्यायी मार्गाने गडपायथ्याच्या अगदी पवारवाडी पर्यंत डांबरी रस्ता असून हा पक्का डांबरी रस्ता जिथे संपतो तिथूनच सोनगड किल्ल्यावर जाणारी पायवाट सुरु होते.    
   सोनगड हा सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या कुडाळ तालुक्यात येणारा गिरिदुर्ग. याची समुद्रसपाटीपासूनची उंची साधारण ११५० फुट इतकी आहे. गडपायथ्याच्या पवारवाडीतून 'सोनगड' किल्ल्याचा दक्षिणोत्तर पसरलेला आयताकृती डोंगर नजरेस पडतो. कुडाळ किंवा घोटगे-सोनवडेमार्गे एक डांबरी रस्ता पवारवाडीत येऊन थांबतो. ज्या ठिकाणी डांबरी रस्ता संपतो आणि कच्च्या रस्त्याला सुरवात होते तिथेच उजव्या हाताला एक ठळक पायवाट डोंगरवर चढताना दिसते. हीच वाट आपल्याला सोनगड किल्ल्यावर घेऊन जाते. किल्ल्याची एक डोंगरधार बराच वळसा घालून खाली पवारवाडीपर्यंत उतरलेली आहे. ही डोंगरधार चढून दोन डोंगरामधे असणाऱ्या सपाटीवर पोहोचणे हे आपले पहिले लक्ष असते. इथंपर्यंत जाणारी साधारण अर्ध्या तासाची पायवाट करवंद आणि जांभळाच्या दाट झाडीतून वर चढत राहते. 
करवंदाच्या दाट झाडीतून सोनगड किल्ल्यावर जाणारी पायवाट

साधारण अर्ध्या तासाची खडी आणि दमवणारी वाट चढून आपण दोन डोंगरांमध्ये असणाऱ्या थोड्या सपाटीवर येऊन पोहोचतो. सपाटीवर पोहोचल्यावर किल्ला समोर दिसायला लागतो पण किल्ल्याचा माथा गाठण्यासाठी मात्र वाटेतले आणखी दोन-तीन डोंगरटप्पे पार करावे लागतात. आता इथून पायवाट सरळसोट एका धारेवरून किल्ल्याच्या दिशेने चढू लागते. खडी चढण आणि विरळ होत जाणारी झाडी यामधून मार्गक्रमण करत पुढच्या पाऊण तासात आपण किल्ल्यासमोर असणाऱ्या शेवटच्या डोंगरावर येऊन पोहोचतो. आता आपण उभे असलेला डोंगर थोडासा उतरायचा आणि समोर दिसणाऱ्या किल्ल्याच्या मुख्य डोंगराचा थोडका चढ चढून डावीकडे किल्ल्यावर जाणारी पायवाट धरायची. या पायवाटेने मार्गक्रमण करत असताना उजवीकडे पाहिले असता किल्ल्याचे अनेक मोठाले दगड खाली कोसळून एक नैसर्गिक खिडकी तयार झालेली दिसते. स्थानिक लोक या नेढ्याला “भीमाची आकडी” अश्या चमत्कारिक नावाने ओळखतात. या नेढ्याच्या आजूबाजूला दाट काटेरी झुडपांचे साम्राज्य असल्याने लांबूनच हे नेढे आपल्या कॅमेऱ्यात कैद करायचे आणि पुढच्या दहा मिनिटात किल्ल्याच्या पश्चिमाभिमुख उध्वस्त दरवाज्यात दाखल व्हायचे.
अर्ध्या तासाच्या चढणीनंतर आपण थोड्या सपाटीवर येतो. तिथून दिसणारा सोनगड किल्ला

किल्ल्याची वाट चढताना असे दोन-तीन डोंगरटप्पे पार करावे लागतात

सोनगड किल्ल्याचा माथा
किल्ल्यासमोर असणारा शेवटचा डोंगर चढून गेल्यावर समोर दिसणारा सोनगड

"भीमाची आकडी" नावाचे नैसर्गिक खिडकी/नेढे

"भीमाची आकडी"

किल्ल्याचा दरवाजा पूर्णपणे उध्वस्त झालेला असून दरवाज्यासमोर असणाऱ्या दहा-बारा दगडी पायऱ्या आणि उजव्या बाजूला तग धरून उभा असलेला एक पडका बुरुज इतिहासकाळात येथे एक दरवाजा असावा याची साक्ष देतो.ईथेच एक शिवलिंग आहे.अर्थात मंदिर नष्ट झाले आहे. भग्न दरवाज्यातून आत प्रवेश करताच किल्ल्याचा माथा आणखी १०० फुट उंचावलेला दिसतो. येथून उजव्या हाताने दरवाज्याच्या बाजूला असलेल्या तटबंदीवरून चालत जात पुढच्या १० मिनिटात आपण गडमाथ्यावर दाखल होतो. गडपायथ्याच्या पवारवाडीतून इथंपर्यंत पोहोचण्यास साधारण दोन तास लागतात. 
किल्ल्याचा उध्वस्त दरवाजा आणि पायऱ्या

गडाचा मधला भाग खोलगट आकाराचा आहे.तटबंदी अर्थातच नष्ट झाली आहे.मानवी वावर फारसा नसल्याने गडमाथ्यावर सर्वत्र झाडी माजली आहे.या झाडीत काही चौथरे आहेत.
गडमाथ्यावर पोहोचताच समोर पिंपळ वृक्षाच्या छायेत एक झोपडीवजा घरटे दिसते. हे झोपडे म्हणजे गडपायथ्याच्या ग्रामस्थांनी उभारलेले भैरवनाथाचे मंदिर होय. या छप्पर उडून गेलेल्या झोपडीवजा मंदिरात कोणत्याही देवतेची मूर्ती नाही. मात्र झोपडीत काही भांडी मांडून ठेवलेली दिसतात. या मंदिरातील देव म्हणजेच भैरवाची मूर्ती मंदिराच्या मागे असणाऱ्या एका जोत्यावर पिंपळवृक्षाच्या छायेत ठेवलेली आहे. या जोत्याच्या जवळच अजून एक अगदी तशीच दिसणारी पण थोडी अधिक जीर्ण झालेली दुसरी भैरवाची मूर्ती देखील आहे. 
किल्ल्यावरील सोनदेव उर्फ भैरवनाथाने झोपडीवजा मंदिर
गडावरील सोनदेव उर्फ भैरवाची नवी व जुनी मूर्ती

मंदिरासमोरच ५ ते ६ फुट उंचीची दगडांवर दगड रचून तयार केलेली एक भक्कम भिंत आपले लक्ष वेधून घेते. ही आहे गडावरील सर्वात मोठी वास्तू म्हणजे राजवाडा किंवा किल्लेदाराचा वाडा. या वाड्याचे अवशेष पाहून तसेच मागे किल्ल्याच्या टोकाकडे चालत जाताच दोन बुरुज आपल्याला दिसतात. या दोन्ही बुरुजांवर मातीचे अनेक थर साचले असून या दोन्ही बुरुजातून किल्ल्याखाली उतरणारी एक अवघड वाट दिसते.या वाटेने खाली उतरल्यास एक मोठी गुहा दिसते.या गुहेत बारमाही पाणी आहे.मात्र हि वाट निसरडी व अवघड आहे.बरोबर वाटाड्य असेल तरच गुहेपर्यंत जाता येईल.
 येथे बुरूजाजवळ एक कातळात खोदलेले पण पूर्णपणे कोरडे पडलेले पाण्याचे टाके आहे. हे अवशेष पाहून पुन्हा गडप्रवेश केलेल्या दरवाज्यात परत येत असताना गडाच्या एका टोकाला हिरव्यागार झाडांनी भरलेला एक भला मोठा खड्डा दिसतो. हा खड्डा म्हणजे गडावरील एक कोरडा पडलेला तलाव होय. हे सर्व अवशेष पाहून आपली साधारण तासाभराची गडफेरी पूर्ण होते. 
गडावरील राजवाडा किंवा वाड्याचे अवशेष

दोन शेजारी शेजारी असणारे उध्वस्त बुरुज. दोन्ही मातीच्या ढिगाऱ्याखाली बुजले आहेत

कातळात खोदलेले पण सध्या कोरडे पडलेले पाण्याचे टाके
     गडाच्या दक्षिण टोकावरुन पुर्व पश्चिम पसरलेली सह्याद्रीची रांग दिसते.सोनगड व सह्याद्रीची मुख्य रांग याच्यामधील दरी छान दिसते.यातील अंतर फारतर दोन-तीनशे फुट असेल.इथून थेट सह्याद्रीच्या धारेवर जाता येते,मात्र वाट अवघड आहे.याच परिसरात गड नदीचे उगमस्थान आहे.गडाचा माथ्यावरुन ईशान्य दिशेला भैरवगड दिसतो.
सोनगड किल्ला व्यवस्थित पाहून पवारवाडीत परतण्यासाठी साधारण ४ ते ५ तासांचा कालावधी लागतो. गडावर पिण्याचे पाणी उपलब्ध नसल्याने गडप्रेमींनी गड पायथ्याच्या पवारवाडीतूनच पाण्याच्या बाटल्या भरून न्याव्यात.
 संदर्भग्रंथः-
१) गड,किल्ले सिंधुदुर्ग जिल्ह्यातील- सतिश अक्कलकोट
२) https://durgwedh.blogspot.com हा ब्लॉग
३) www.durgbharari.in हि वेबसाईट
४) डोंगरयात्रा- आनंद पाळंदे
५) सांगाती सह्याद्रीचा- यंग झिंगारो ट्रेकर्स


सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आडवाटेवरील दुर्लक्षित गिरिदुर्ग सोनगड 
सिंधुदुर्ग! नैसर्गिक लावण्य आणि उज्ज्वल ऐतिहासिक वारसा असा अनोखा संगम लाभलेला जिल्हा. अथांग पसरलेला निळाशार समुद्रकिनारा, रुपेरी वाळू, हिरवीगार दाट वनराई आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या असामान्य कर्तृत्वाची साक्ष देणारा सिंधुदुर्ग किल्ला. महाराष्ट्रातील पहिला पर्यटन जिल्ह्याचा बहुमान असणाऱ्या सिंधुदुर्ग जिल्ह्यात असणारा शिवलंका सिंधूदुर्ग आपल्या सगळ्यांना परिचयाचा आहे पण त्याचबरोबर या जिल्ह्यात आणखी तब्बल २३ किल्ले आहेत हे फार कमी लोकांना माहिती आहे. या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील किल्ल्यांची तालुकावार यादी खालील प्रमाणे: 
१) तालुका देवगड - विजयदुर्ग, देवगड, सदानंदगड, कोटकामते
२) तालुका मालवण - रामगड, भगवंतगड, भरतगड, सिद्धगड, वेताळगड, सर्जेकोट, राजकोट, पद्मगड, सिंधुदुर्ग 
३) तालुका वेंगुर्ला - निवती, यशवंतगड 
४) तालुका कणकवली - खारेपाटण, भैरवगड 
५) तालुका कुडाळ - सोनगड, मनोहरगड, मनसंतोषगड 
६) तालुका सावंतवाडी - नारायणगड, महादेवगड 
७) तालुका दोडामार्ग - हनुमंतगड, बांदा 
वरील सर्व किल्ल्यांची वर्गवारी ढोबळपणे जलदुर्ग, किनारीदुर्ग, गिरीदुर्ग आणि वनदुर्ग अश्या चार प्रकारात करता येईल. पुणे किंवा मुंबई येथून शुक्रवारी रात्री निघायचं आणि भल्या पहाटे सिंधूदुर्ग जिल्ह्याच्या सीमेवर डेरेदाखल व्हायचं. मग दोन दिवसांत तुम्ही या जिल्ह्यातील किमान चार गिरिदुर्ग निवांत बघून तुमचा विकेंड सार्थकी लावू शकता. त्यात जर का फक्त जलदुर्गच बघायचे ठरवले तर दोन दिवसात सात-आठ किल्ले तरी आरामात बघून होतात. बस फक्त थोडे आडवाटेवरचे आणि अवशेष कमी असले तरी किल्ले पाहण्याचा ध्यास हवा.
घाटमाथ्यावर राहणाऱ्या माणसाला उन्हाळ्यात कोकणात नुसतं फिरायला जायचं म्हणजे सुद्धा सजा वाटते. डोक्यावर टळटळीत ऊन आणि फुंकर मारली तरी पान देखील हलणार नाही असं दमट वातावरण. आमची या वेळेची सिंधूदुर्ग जिल्ह्यातील गिरिदुर्गांची भटकंती पण अशीच भर वैशाखातल्या उन्हातली. पण मनी ध्यास होता तो काही अल्पपरिचित, आडवाटेवरील आणि उपेक्षित गिरिदुर्गांची भटकंती करण्याचा. त्यात या ट्रेकला सोबत यायला माझ्यासारखाच किल्लेप्रेमी आणि नेहमीचा हक्काचा ट्रेकर मित्र प्रसाद परदेशी आणि त्याची बायको नेहा येणार म्हणल्यावर माझ्या गाडीतल्या पाच पैकी तीन जागा आधीच फिक्स झाल्या. आता फक्त अजून दोन जागा भरणे शिल्लक होते. मग ट्रेक संबंधी सगळ्या व्हाट्सअँप ग्रुपवर या ट्रेकबद्दलची माहिती टाकून कोणी येतंय का त्याची वाट पाहत बसलो. पहिले दोन दिवस कुठल्याच ग्रुपमधून काही प्रतिसाद आला नाही. येणार तरी कसा म्हणा, उन्हाळा आणि त्यात सिंधूदुर्ग जिल्ह्यातले गिरिदुर्ग करणार म्हणल्यावर सगळ्यांनी मला मनातल्या मनात का होईना पण वेड्यात काढलं असणार हे मात्र नक्की.
आम्ही तिघांनी का होईना पण हा ट्रेक करायचाच असे ठरवले. तेवढ्यात ट्रेकला निघण्याच्या दोन दिवस आधी एका ट्रेकसंबंधी व्हाट्सअँप ग्रुपमुळे परिचयाच्या झालेल्या अ‍ॅड. विंदा महाजन यांचा फोन आला. त्या आणि त्यांची एक मैत्रीण सुनिता या ट्रेकला येण्यासाठी इच्छुक आहेत असे त्यांनी सांगितले. या दोघी माझ्याबरोबर पहिल्यांदाच ट्रेकला येणार असल्याने त्यांना ट्रेकबद्दल व्यवस्थित माहिती दिली. एक तर भर उन्हाळा, त्यात मी दीड-दोन तास एखादा डोंगर चढवणार आणि वर जाऊन यांना दाखवणार काय तर थोडीफार कुठंतरी शिल्लक असलेली तटबंदी, एक-दोन कोरडी पाण्याची टाकी आणि काही उध्वस्त अवशेष. त्यात हा ट्रेक अल्पपरिचित आणि दुर्लक्षित किल्ल्यांचा, त्यामुळे यावर नेमके कोणते अवशेष आहेत ते मलाच फारसे माहित नव्हते. पण या दोघींनी सगळं नीट समजावून घेतलं आणि जेवढे जमतील तेवढे किल्ले चढू नाहीतर किल्ल्याच्या पायथ्याच्या गावात भटकू अशी संमती दर्शवली. मग काय माझी गाडी आणि पाच ट्रेकर निघालो सिंधूदुर्ग जिल्ह्यात गड-किल्ले भटकायला!
माझी निलपरी (TATA TIAGO) आणि मी शुक्रवार दिनांक, १३ एप्रिल २०१८ च्या रात्री ८.३० वाजता चिंचवडवरून निघालो आणि चांदणी चौक, नवले ब्रिज, आंबेगाव असे पिकअप करत ९.३० च्या सुमारास नवीन कात्रज बोगद्यातून सातारा रस्त्याला लागलो. पुणे – कोल्हापूर – राधानगरी – फोंडाघाट – कनेडी असा रस्ता धरला आणि मोजून फक्त दोन ठिकाणी पाच-दहा मिनिटांचे थांबे घेत मध्यरात्री पावणेचार वाजण्याच्या सुमारास तब्बल ३७० किलोमीटरचा प्रवास करून सिंधूदुर्ग जिल्ह्यातील नरडवे गावात पोहोचलो. पहाटे लवकर उठून घोटग्याचा सोनगड आणि थोडं ऊन उतरल्यावर दुपारच्या सत्रात नरडव्याचा भैरवगड असे दोन गिरीदुर्ग पहिल्या दिवशी पहायचे आणि वेताळगडसिद्धगड आणि सदानंदगड असे इतर तीन छोटे गिरिदुर्ग दुसऱ्या दिवशी पाहून साधारण दुपारी ४.३० च्या सुमारास पुण्याकडे प्रस्थान करायचे असा सुटसुटीत प्लान बनवला होता. ज्यांची पुस्तके वाचून आम्हा किल्ले प्रेमींना अल्पपरिचित किल्ल्यांची माहिती मिळते असे दुर्गअभ्यासक ‘भगवान चिले’ सर यांच्या ‘दुर्गम दुर्ग’ या पुस्तकानुसार सोनगड हा किल्ला चढायला जरा जास्त वेळ खाणारा होता. त्यामुळे शनिवारी पहाटे कितीही उशीर झाला तरी सोनगड या किल्ल्याच्या पायथ्याशीच जाऊन झोपायचे असे ठरवले होते. पण चिले सरांनी त्यांच्या पुस्तकात नमूद केलेले दुर्गवाडी हे गाव काही केल्या गुगल मॅप वर सापडत नव्हते. पण हे गाव नरडवे ते घोटगे या दोन मोठ्या गावांच्या दरम्यान कुठे तरी नक्की असणार असा अंदाज आलेला असल्याने मध्यरात्री नरडवे गाव ओलांडून तसेच पुढे जाऊ लागलो. पण नरडवे गाव ओलांडताच आत्तापर्यंत डांबरी असणारा रस्ता एकदम कच्च्या मातीच्या रस्त्यात रुपांतरीत झाला. आता मात्र आपण बरोबर रस्त्याने चाललो आहोत की नाही अशी शंकेची पाल मनात चुकचुकली. त्यात एवढ्या मध्यरात्री रस्ता सांगायला कोणीही भेटणार नसल्याने यू-टर्न घेतला आणि पुन्हा मागे फिरून नरडवे गावाच्या थोडे अलीकडे असणाऱ्या एका मंदिरात सकाळ होईपर्यंत विश्रांती घेण्याचे ठरवले. 

नरडवे गावाजवळ असणारे "श्री विठ्ठलादेवी मंदिर". येथे शनिवारी पहाटे मुक्काम केला

सकाळी सहाच्या सुमारास आकाशात झुंजूमुंजू व्हायला लागलं तसं जाग आली ती रस्त्यावर जोरजोरात बोलत चाललेल्या काही माणसांमुळे. जवळच्याच नरडवे गावातली काही उत्साही मंडळी फिरायला म्हणून बाहेर पडलेली होती. त्यांनाच मग सोनगड किल्ल्याविषयी माहिती विचारली तसे त्यांनी उभारल्या जागेवरूनच लांब कुठेतरी एका डोंगरधारेकडे बोट दाखवत ‘सोनगड’ किल्ला त्या तिकडे पलीकडे आहे असं सांगितलं. आता माझ्यासाठी त्या लोकांना ‘सोनगड’ किल्ला माहित असणे हिच एक मोठी आणि आनंदाची गोष्ट होती. कारण आजकाल बऱ्याच दुर्लक्षित आणि आडवाटेवरच्या किल्ल्याबाबत त्या किल्ल्याच्या आसपास राहणाऱ्या गावकऱ्यांनाच माहिती नसते. पण इथं मात्र परिस्थिती आशाजनक होती. या लोकांना त्यांच्या गावजवळच्या 
भैरवगड’ या किल्ल्यारोबरच सोनगड किल्ल्याची देखील व्यवस्थित माहिती होती. त्यांच्याकडून कळले की सोनगड किल्ल्याच्या पायथ्याशी दुर्गानगर’ नावाचे गाव असून त्याच्या ‘पवारवाडी’ या छोट्या वस्तीतून किल्ल्यावर जाणारी एक वाट आहे. पण नरडवे गावानंतर ‘गड’ नदीवर नव्यानेच धरण बांधण्याचे काम सुरु असल्याने नरडवे गावानंतर पवारवाडी पर्यंत ७ किमीचा कच्चा मातीचा रस्ता पार करावा लागेल. या कच्च्या रस्त्याला पर्याय म्हणजे फोंडा घाट उतरल्यानंतर थेट कणकवली गाठायची आणि कनेडी – कणकवली – वागदे – कसाल – घोटगे – सोनवडेमार्गे गडपायथ्याची पवारवाडी गाठायची. या पर्यायी मार्गाने गडपायथ्याच्या अगदी पवारवाडी पर्यंत डांबरी रस्ता असून हा पक्का डांबरी रस्ता जिथे संपतो तिथूनच सोनगड किल्ल्यावर जाणारी पायवाट सुरु होते. पण आम्ही फोंडा घाट उतरून बऱ्यापैकी पुढे नरडवे गावापर्यंत पोहोचलेलो असल्यामुळे परत उलटे जाऊन जवळपास ३० किमीचा अधिकचा फेरा वाढवण्यापेक्षा कच्च्या रस्त्यानेच गडपायथा गाठण्याचा निर्णय घेतला. 
सकाळची आन्हिके पार पाडून मुक्कामाची जागा सोडेपर्यंत सात वाजत आले होते. त्यात भर उन्हाळा आणि एप्रिलचा महिना त्यामुळे, सूर्यराव सकाळी जरा लवकरच ड्युटीवर हजर झालेले. खरंतर ज्यावेळेपर्यंत आम्ही अर्धाअधिक किल्ला चढून जाणे अपेक्षित होते त्यावेळी आत्ता कुठे आम्ही मुक्कामाची जागा सोडत होतो. त्यामुळे आता किल्ला चढताना उन्हाचा चांगलाच त्रास होणार यात तिळमात्र शंका नव्हती. त्यात नरडवे गावानंतरचा कच्चा रस्ता पार करताना गाडीचा वेग देखील मंदावला. हळू हळू गाडी चालवत पवारवाडी गाठेपर्यंत सकाळचे पावणेआठ झाले. गावातून किल्ल्यावर वाट दाखवण्यासाठी कोणी येईल का याची शोधाशोध करण्यात पुन्हा १५ मिनिटे खर्ची पडली. गावात भेटलेला प्रत्येकजण आमच्याकडे बघून “तुम्ही किल्ला चढणार का?”, “पाणी मुबलक घेतलं आहे का?” असे प्रश्न विचारू लागला. बहुदा त्यांना देखील आम्ही एवढ्या भर उन्हाळयात हा डोंगरी किल्ला चढून जाऊ की नाही अशी काळजी वजा शंका वाटत असावी. खूपच विनवणी केल्यानंतर एक वयस्कर मामा किल्ल्यावर यायला तयार झाले. गाडी रस्त्याकडेला व्यवस्थित उभी करून प्रत्येकी किमान ३ लिटर पाणी बरोबर घेतले आहे याची खात्री केली आणि सकाळी सव्वाआठ वाजता ‘सोनगडा’च्या डोंगर चढाईला भिडलो. 
आता जरा गडाच्या इतिहासात डोकावून पाहू. ऐतिहासिक कागदपत्रात सोनगड किल्ल्याचा उल्लेख नरसिंहगड किंवा नृसिंहगड असा देखील आला आहे. इतिहासकाळात मालवण बंदरात येणारा माल घोटगे घाटातून घाटमाथ्यावरील आजरा किंवा पाटगाव मार्गे कोल्हापुरास जात असे. या घोटगे घाटावर लक्ष ठेवण्यासाठी या गडाची निर्मिती झाली असावी. या घाटमार्गाच्या मुखाशी घाटमाथ्यावर रांगणा हा एक इतिहासप्रसिद्ध आणि मोठा किल्ला आहे. सोनगड उर्फ नरसिंहगडाचे रांगणा किल्ल्याशी असणारे निकटत्व पाहता सोनगड हा रांगणा किल्ल्याच्या प्रभावळीतील येणारा एक महत्वाचा किल्ला असू शकेल. हा किल्ला बांधण्याचे श्रेय खेम सावंत यांना जाते. त्यांनी इ.स. १७०९ ते १७३८ दरम्यान सोनगडाची दुरुस्ती केली. इ.स. १७८८ मधे करवीर सत्तेने घोटगे घाटाने उतरून किल्ल्यास मोर्चे लावले आणि गड ताब्यात घेतला. पण इ.स. १७९३ मधे झालेल्या समेटानंतर गड पुन्हा सावंतांकडे आला. त्यावेळी गडावर धोंडो लक्ष्मण लेले यांना किल्लेदार नेमण्यात आले. पुढे १८०५ मधे सावंतांच्या गृहकलहात हस्तक्षेप करून रांगण्याचे राणोजी निंबाळकर यांनी गड ताब्यात घेतला. पण १८१८ मधे जेव्हा इंग्रजांनी महाराष्ट्रातील जवळपास सगळ्या किल्ल्यांचा ताबा घेतला तेव्हा हा किल्ला मात्र करवीरकरांकडे ठेवला जो शेवटपर्यंत त्यांच्याकडेच राहिला. (ऐतिहासिक संदर्भ: डोंगरयात्रेत दिसलेल्या दुर्गवास्तू)
किल्ल्याला लाभलेली नैसर्गिक कातळकोरीव तटबंदी

समोर घाटमाथ्यावर कुठे तरी रांगणा किल्ला असावा का?

किल्ल्याच्या पायथ्याला वाहणाऱ्या गड नदीचे कोरडे पात्र आणि आजूबाजूचा डोंगररांगांनी वेढलेला परिसर

आम्ही सोनगड किल्ला पाहून गावात उतरलो तेव्हा दुपारचे १ वाजले होते. भर दुपारचं ते जीवघेणं ऊन आता सगळ्यांनाच नकोस झालेलं होतं. त्यात तहान लागल्यामुळे घश्याला कोरड पडलेली. पाठीवरच्या सॅकमधे अजूनही एक बाटली पाणी शिल्लक होते पण ते इतकं गरम झालेलं की ते पिण्याची अजिबात इच्छा होत नव्हती. कधी एकदा वाटाड्या म्हणून सोबत आलेल्या मामांच्या कौलारू घरात सावली खाली बसतोय आणि थंड पाणी पिऊन तापलेलं शरीर थंड करतोय असं वाटत होतं. गड उतरून डांबरी रस्त्याला लागलो तसे सगळ्यांनी मामांच्या घराकडे धूम ठोकली. मलाही अगदी तेच करायचं होतं. पण खाली येऊन पाहतोय तर काय गाडी भर उन्हात तापत होती. ती पटकन सावलीत लावण खूप गरजेच होतं. कारण एकदा का मी सावलीत जाऊन बसलो तर लगेच बाहेर येणं मुश्कील आणि सावलीत थंड झालेल्या शरीराला पुन्हा गरम झालेल्या गाडीत कोंबण तर त्याहूनही मुश्कील. त्यामुळे नाईलाजाने का होईना मी गाडीजवळ गेलो. गाडीपासून फक्त १०० मीटर अंतरावर आंब्याचं एक मस्त डेरेदार झाड होतं. ट्रेकर टीम मधल्या बाकी कोणालाही ड्रायविंग येत नसल्यामुळे त्या तापलेल्या गाडीत बसून ती सावलीत नेण्याचा भीम पराक्रम मलाच पार पाडावा लागणार होता. आधीच भर उन्हात गड उतरल्यामुळे पूर्ण शरीरातून गरम वाफा निघत होत्या आणि त्यात आता या तापलेल्या गाडीत बसायचं होतं. गाडीचा दरवाजा उघडला आणि ड्रायव्हिंग सीटवर बसलो तसा "कौन बनेगा करोडपती"च्या हॉट सीटवर बसल्याचा फील आला. स्टेरिंग, गियर, सिटकव्हर असं ज्याला हात लावेल ते सगळं भयंकर तापलेलं. 
गाडीच्या काचा खाली करून कशी तरी गाडी चालू केली आणि समोर दिसणाऱ्या आंब्याच्या झाडाखाली आणली. त्यानंतर मात्र अक्षरशः गाडीतून बाहेर उडी टाकली. या दोन तीन मिनिटात खालून-वरून, मागून-पुढून सगळीकडून चटके बसले होते. हुश्श! गड चढण्या-उतरण्यापेक्षाही हे एक भयंकर अवघड काम पार पाडल्यासारख वाटून गेलं. 
वाटाडया मामांच्या घरात गेलो तसं जमिनीवर अक्षरशः अंग झोकून दिलं आणि थोड्यावेळ शांत पडून राहिलो. थोड्याच वेळात मामांकडून सगळ्यांना जेवणाचा आग्रह झाला. बहुदा आम्ही किल्ल्यावर जातानाच त्यांनी माणसं मोजली होती आणि आम्ही किल्ला पाहून परत येईपर्यंत जेवण तयार करून ठेवलं होत. खूप आग्रह झाल्यावर मग मामांच्या त्या सुंदर कौलारू घरात पंख्याची थंड हवा घेत जेवण उरकलं. आता सगळ्यांच तापलेलं शरीर देखील नॉर्मल व्हायला लागलं होतं. साधारण दुपारी २.०० पर्यंत जेवणाचा कार्यक्रम उरकला तसा हळूच पुढच्या किल्ल्याचा विषय काढला. पण कुणालाच त्या भर उन्हात पुन्हा बाहेर पडून दुसरा किल्ला करण्याची इच्छा दिसत नव्हती. तसेही दुपारी २.३० वाजता पवारवाडीतून निघून पुन्हा आलेल्याच कच्च्या रस्त्याने नरडवे गाव गाठायचे आणि मग तिथून भैरवगडाच्या पायथ्याच्या भेर्देवाडीत पोहोचायला कमीत कमी ३.३० वाजणार होते. त्यामुळे अंधार पडायच्या आत भैरवगड पाहून गावात परत येणे थोडे कठीण वाटत होते. त्यामुळे पुढचे प्लानिंग नंतर बघू असे म्हणत सर्वांनी तिथेच मामांच्या घरात पंख्याची थंड हवा घेत विश्रांती घेण्याचा ठरावा पास झाला. आदल्या रात्री अपुरी झोप झाल्यामुळे पुढच्या फक्त पाचच मिनिटात सगळ्यांच्या घोरण्याचे आवाज सुरु झाले. 
साधारण तासाभराच्या गाढ झोपेनंतर जाग आली तेव्हा दुपारचे सव्वातीन वाजलेले. तोंड धुऊन सगळे फ्रेश झालो तसा न मागताच कोरा फक्कड चहा मामांनी समोर आणून ठेवला. मग चहा घेता घेताच पुढचा नवीन प्लान तयार केला. नरडवेचा भैरवगड आज करणे आता अशक्य आहे तर मग त्याऐवजी दुसऱ्या दिवशी करायचा 'वेताळगड' हा छोटा डोंगरी किल्ला आज करूया आणि रात्री जरा लवकरच भैरवगडाच्या पायथ्याच्या भेर्देवाडीत मुक्कामाला जाऊया असा नवीन प्लान तयार झाला. या नवीन प्लानमुळे कमीतकमी ५० किलोमीटरचा जास्तीचा फेरा पडणार होता खरा पण ठरवलेले पाचही किल्ले करता येणे शक्य असल्याने सगळ्यांनीच नवीन प्लानला लगेच संमती दिली. ट्रेकला कमी लोक बरोबर असण्याचा हा एक फायदा असतो. अश्यामुळे कोणत्याही निर्णयावर शिक्कामोर्तब होण्यासाठी फार वेळ लागत नाही. मामांना त्यांची योग्य ती बिदागी देऊन त्यांचा निरोप घेतला. कुडाळ रस्त्याला गाडी लागली तेव्हा दुपारचे पावणेचार वाजले होते. पवारवाडी ते वेताळगडाच्या पायथ्याची गावडेवाडी हे जवळपास ५० किलोमीटरचे अंतर आणि वेताळगड किल्ला पाहणे हे सर्व आता पुढच्या तीन तासात व्हायला हवे होते. पण गाडीचे सारथ्य माझ्या विश्वासू हातात असल्यामुळे ठरवलेलं सगळं वेळेत होणार याची बाकीच्या ट्रेकर भिडूंना शाश्वती होती आणि झालं देखील तसंच. 
पण आता या अल्पपरिचित वेताळगडाची भ्रमंती एका नवीन ब्लॉगद्वारे करू. तोपर्यंत येथेच लेखणी थांबवतो. धन्यवाद!
ट्रेक दिनांक: शनिवार, १४ एप्रिल २०१८  
ट्रेकर मंडळ: विनीत दाते, प्रसाद परदेशी, नेहा परदेशी, अ‍ॅड. विंदा महाजन आणि सुनिता राजे-निंबाळकर 
किल्ल्याचे नाव: सोनगड   किल्ल्याची उंची:  ३५० मीटर
जिल्हा : सिंधुदुर्ग, तालुका : कुडाळ
किल्ल्याचा प्रकार: गिरिदुर्ग, चढाई श्रेणी: सोपी
पाण्याची सोय: किल्ल्यावर पाण्याची सोय नाही. पावसाळ्यात किल्ल्यावरील तलावात पाणी साठते जे जानेवारी अखेरपर्यंत राहते मात्र पिण्यायोग्य नाही 
राहाण्याची सोय: किल्ल्यावर राहाण्याची सोय नाही. गडपायथ्याच्या वाडीतील मंदिरात मुक्काम करता येईल. 
किल्ल्यावर जाण्यासाठी लागणारा वेळ: पायथ्यापासून गडमाथा गाठण्यास साधारण २ तास.
जाण्यासाठी उत्तम कालावधी: मार्च ते मे हा उन्हाळ्याचा कालावधी सोडून वर्षभर कधीही. पावसाळ्यानंतर गेल्यास उत्तम
भटकंतीचा कालावधी: मुंबई/पुणे येथून दोन दिवस
प्रवासाचा मार्ग: पुणे-कोल्हापूर-राधानगरी-
 
 




















 
 
 
 
 
 प्रकार : गिरीदुर्ग

जिल्हा : सिंधुदुर्ग

उंची : २०५० फुट

श्रेणी : मध्यम

कोकणच्या पूर्वेला सह्याद्रीच्या पर्वतरांगेत पुणे,सातारा, सांगली, कोल्हापुर या जिल्ह्यांच्या सीमा येतात. सह्याद्रीच्या या पर्वतरांगेत कोकणात उतरणाऱ्या घाट वाटांवर लक्ष ठेवण्यासाठी घाटावर व घाटाखाली किल्ल्यांची साखळी निर्माण करत लहानमोठे असे अनेक किल्ले बांधले गेले. दुर्गप्रेमीना आजही अपरीचीत असलेले नरडवे व घोटगे घाटावर लक्ष ठेवण्यासाठी बांधलेले भैरवगड व सोनगड हे त्यापैकीच. यातील घोटगे घाटावर लक्ष ठेवण्यासाठी बांधलेला सोनगड कागदोपत्री नरसिंहगड म्हणुन ओळखला जातो. या भागातुन वाहणाऱ्या गड नदीने तालुक्याचे दोन भाग केले असुन जवळजवळ असूनही भैरवगड कणकवली तालुक्यात तर सोनगड कुडाळ तालुक्यात येतो. खाजगी वाहन सोबत असेल तर बरीचशी पायपीट वाचते व एका दिवसात हे दोन्ही किल्ले सहज पाहुन होतात अन्यथा दोन दिवस हाताशी हवेत. सोनगड किल्ल्यास जाण्यासाठी सर्वप्रथम आपल्याला किल्ल्याच्या पायथ्याचे सोनवडे गाव गाठावे लागते. ... कुडाळहुन घोटगेमार्गे सोनवडे हे अंतर ४३ कि.मी. असुन कणकवली ते सोनवडे हे अंतर २५ कि.मी.आहे. सोनगड व भैरवगड एकत्र पहायचा असल्यास नरडवे ते सोनवडे हे अंतर पक्क्या रस्त्याने १.५ कि.मी. असुन नरडवे जुने स्थानक येथुन चालत फक्त २० मिनिटांचे आहे. त्यामुळे नरडवे येथे उतरून सोनवडे येथे जाणे जास्त सोयीचे आहे. हा रस्ता गुगल नकाशावर दिसत नाही. सोनगड किल्ल्याचा डोंगर दक्षिणोत्तर पसरलेला असुन गावातुन गडावर जाण्यासाठी ३ वाटा आहेत. यातील एक वाट डोंगराच्या दक्षिण सोंडेवरून गडावर चढते तर उर्वरीत दोन वाटा डोंगराच्या उत्तर सोंडेवरून गडावर जातात. घोटगे येथुन सोनवडे गावात येताना नदी पार केल्यावर उजव्या बाजुस सोनवडे घाटरस्त्याचे काम सुरू आहे. खाजगी वाहन सोबत असल्यास चालण्याचे बरेच अंतर कमी होऊन या रस्त्याने आपण गडाच्या अर्ध्या उंचीवर पोहोचतो. येथुन मळलेली पायवाट डोंगराच्या दक्षिण सोंडेवरून गडाच्या उध्वस्त तटबंदी मधुन गडावर प्रवेश करते. दुसरी वाट सोनवडे गावातील लिंगेश्वर मंदिराजवळ असलेल्या शाळेकडून मुख्य वाडीतुन गडाच्या उत्तर सोंडेवर जाते. या वाडीच्या टोकाला सध्या सहकार कृषी पर्यटन केंद्राची उभारणी केली जात आहे. या वाटेवर खाडी चढण असुन वाट मळलेली असली तरी वाटेला असंख्य ढोरवाटा असुन मुख्य वाटेचा मागोवा घेतच वर चढावे लागते. तिसऱ्या वाटेने सोनवडे गावातुन नरडवे गावाकडे जाताना मुख्य रस्ता उजवीकडे गडाच्या उत्तर सोंडेकडे वळतो. या रस्त्याने साधारण ३ कि. मी.पुढे आपण सोनवडे गावाच्या विरुद्ध बाजुस उत्तरेकडील डोंगरधारेखाली येतो. येथील एका मोठ्या वळणावरून या धारेवर जाता येते. मागील दोन वाटांनी गडाच्या दोन बुरुजामध्ये असलेल्या उध्वस्त दरवाजा मधून आपला गडावर प्रवेश होतो. पहिल्या व तिसऱ्या वाटेने गडावर जाण्यासाठी पाउण तास लागतो पण त्यासाठी सोबत वाहन असणे गरजेचे आहे. सोनवडे गावामधील पायवाटेने गडावर जाण्यासाठी दीड तास लागतो. डोंगराच्या उत्तरेकडील धारेवरून आपण गडाच्या उत्तर बाजुस असलेल्या नेढ्याखाली पोहोचतो. स्थानिक लोकात हे नेढे चांगलेच प्रसिद्ध असुन ते या लंबगोलाकृती नेढ्यास भीमाची आकडी म्हणुन ओळखतात. या नेढ्याखालुन गडावर जाण्यास दोन वाटा आहेत. यातील उजवीकडील वाट दक्षिणेकडील सोंडेवरून येणाऱ्या वाटेला मिळते. आपण मात्र डावीकडील वाटेने गडाकडे निघायचे. येथुन ५ मिनिटात ओबडधोबड पायऱ्यांच्या वाटेने आपण घळीत असलेल्या दोन बुरुजामधील पश्चिमाभिमुख उध्वस्त दरवाजातुन गडावर प्रवेश करतो. हा दरवाजा खालच्या टप्प्यात असुन येथुन गडाचा माथा साधारण ७० ते ८० फुट उंचावर आहे. या भागात मोठया प्रमाणात कारवीचे रान व गवत वाढलेले आहे. येथुन उजवीकडील बाजुने तटबंदीच्या काठाने वर चढत जाऊन आपण गडफेरीस सुरवात करायची. या वाटेने आपण सर्वप्रथम नेढ्याच्या वरील भागात असलेल्या बुरुजावर येतो. या बुरुजावरून डोंगराच्या उत्तर धारेवरून गडावर येणाऱ्या संपुर्ण वाटेवर लक्ष ठेवता येते. या ठिकाणी कारवीची दाट झाडी वाढली असुन एक चौथरा वगळता इतर कोणतेही अवशेष दिसुन येत नाही. तटबंदीच्या काठाने तसेच पुढे निघाल्यावर हि तटबंदी खालील बाजुस उतरत गेलेली असुन या तटाला लागुनच काही वास्तुचे अवशेष आहेत. बांधकामासाठी कोणतेही मिश्रण न वापरता ओबडधोबड दगडात रचलेल्या या तटबंदीचे काही ठिकाणी मातीच्या ढिगाऱ्यात रुपांतर झाले आहे. गडाच्या दक्षिण धारेवरून येणारी पायवाट या उतारावरील तटबंदीतुन गडात प्रवेश करते. या ठिकाणी तटावर एक कोरीव दगड असुन हा दगड शिवलिंग असल्याचे वाचनात येते पण हे शिवलिंग नसुन न्हाणीचा दगड आहे. या उतारावर तटाच्या आतील बाजुस एक मोठा खोल तलाव आहे पण त्यात प्रचंड प्रमाणात जंगल वाढल्याने आत पाणी आहे कि नाही हे कळण्यास मार्ग नाही. तलावाचे पाणी अडविण्यासाठी या ठिकाणी तटाची रुंदी जास्त ठेवण्यात आली आहे. या तलावाच्या काठावर तटबंदीत घडीव दगडात देवडी बांधलेली आहे. येथुन पुढे निघाल्यावर आपण गडाच्या दक्षिण टोकावरील घडीव दगडात बांधलेल्या भल्यामोठ्या बुरुजावर पोहोचतो. या बुरुजावरून गडाच्या दक्षिण धारेवरून गडावर येणारी संपुर्ण वाट नजरेस पडते. दक्षिणेच्या या तटबंदीखाली एक मोठी गुहा असुन त्यात वर्षभर पाणी असल्याचे सांगीतले जाते पण आम्हाला हि गुहा शोधुनही सापडली नाही. बुरुजावरून तटबंदीला वळसा घालत एक बुरुज पार करून आपण गडाच्या पुर्व भागात येतो. गडावर असलेली थोडीफार सपाटी याच भागात आहे. या ठिकाणी पिंपळाच्या झाडाखाली उध्वस्त चौथऱ्यावर भैरवनाथाची मुर्ती ठेवलेली असुन मूर्तीच्या मागील बाजुस भैरवाची भग्न झालेली दुसरी मुर्ती आहे. गावकरी या भैरवाची सोनदेव म्हणुन पूजन करतात. मुर्ती शेजारी छप्पर उडालेली झोपडी असुन या झोपडीत जेवण करण्यासाठी भांडी ठेवलेली आहेत. गावकरी येथे नेहमी दोन कळशी पाणी भरून ठेवतात. मंदिराच्या आवारात कोरडे पडलेले लहान तळे असुन एक उध्वस्त चौथरा आहे. मंदिरासमोरील उंचवट्यावर एका मोठ्या वाड्याचे अवशेष असुन या वाडयाच्या ३-४ फुट उंचीच्या भिंती आजही शिल्लक आहेत. या वाडयाला आतील बाजुस अनेक दालने आहेत. या ठिकाणी गडाची समुद्रसपाटी पासुन उंची २०६० फुट असुन गडाचा परिसर साधारण २५ एकरमध्ये सामावला आहे. गडाची पुर्व बाजू वगळता गडावर फारशी सपाटी नाही. वाडा पाहुन पुन्हा तटबंदीच्या कडेने आपल्या गडदर्शनास सुरवात करावी. वाडयाच्या पुढील भागात तटबंदीच्या काठावर कातळात खोदलेले पाण्याचे टाके आहे. टाके पाहुन पुढे आल्यावर दोन बुरुजात असलेला गडाचा पूर्वाभिमुख दिसतो. या दोन्ही बुरुजाचे मातीच्या ढिगाऱ्यात रुपांतर झालेले आहे. या बुरुजात असलेला दरवाजा पुर्णपणे नष्ट झाला असुन या दरवाजातून खाली उतरत जाणाऱ्या काही पायऱ्या शिल्लक आहेत. गडाखालील हा भाग एका चिंचोळी सोंडेने सह्याद्रीच्या मुख्य रांगेशी जोडला गेला आहे. या पायऱ्यांनी सावधगिरीने खाली उतरून दोन बुरुज,त्यातील दरवाजा व घडीव दगडात बांधलेली शेजारची तटबंदी पहाता येते. गडाचा हा भाग पाहुन तटबंदीवरून आपण उत्तर दिशेला वळतो. येथुन भैरवगड व दूरवर पसरलेले गड नदीचे पात्र नजरेस पडते. या भागात मोठ्या प्रमाणात असलेले वास्तुचे अवशेष पाहता गडाची मुख्य वस्ती याच भागात असावी. या ठिकाणी मोठया प्रमाणात गवत वाढलेले असुन सर्व अवशेष त्यात लपलेले आहेत. येथुन पुढे आल्यावर खोलगट भागात मातीने भरलेला एक मोठा तलाव नजरेस पडतो पण पावसाळा वगळता यात पाणी रहात नाही. तटबंदीच्या काठाने तसेच पुढे आल्यावर कातळात कोरलेले एक लहान टाके नजरेस पडते. येथुन पुढे दाट झाडी व उतार असुन या झाडीतुन मार्ग काढत गेल्यास आपण गडावर प्रवेश केलेल्या ठिकाणी पोहोचतो. संपुर्ण गडफेरीस दीड तास पुरेसा होतो.
© Suresh Nimbalkar
 
 

 

मनसर

 प्रकार : गिरीदुर्ग जिल्हा : नागपुर उंची : १२०० फुट ...