Sunday, March 22, 2026

Satara Radio station final 400 words

1 ) अजिंक्यतारा किल्ला

अजिंक्यतार्याच्या इतिहासात डोकावल्यास  कोल्हापूरच्या शिलहार वंशीय दुसºया भोजराजाने हा किल्ला बांधला. छत्रपती शिवाजीमहाराजांनी हा किल्ला जिंकून ताब्यात घेतला. छत्रपती शिवाजीमहाराजांच्या अंगी ज्वर आल्याने दोन महिने विश्रांती घ्यावी लागली. यानंतर या गडाच्या इतिहासातील महत्वाचा प्रसंग म्हणजे औरंगजेबाने स्वराज्यावर जे आक्रमण केले त्याकाळातील ! मोगलांनी गडाच्या मंगळाई बुरुजाच्या ख्गली दोन सुरुंग पेरले. पहिला सुरुंग उडाल्यावर मराठ्यांचे नुकसान झाले , मात्र दुसरा सुरुंग उडाल्यावर मोगली फौजांचाही नाश झाला.मूठभर मावळ्यांसह किल्ला लढवीतच असताना अखेर दाणागोटा संपला, दारूगोळा संपला तेव्हा किल्लेदार  प्रयागजी प्रभूना  शरणागती पत्करावी लागली. या किल्ल्यावर शाहजादा आझमने निशाण चढवले म्हणून त्याचे नामांतर झाले -'अझमतारा.' मात्र अण्णाजीपंत शाहीराने, ताराराणीच्या वेषांतर केलेल्या सैनिकांच्या मदतीने एक दिवस किल्लाच ताब्यात घेतला. अन् अझमताऱ्याचा झाला 'अजिंक्यतारा !'
         अश्या या इतिहास प्रसिध्द अजिंक्यतारा गडाला भेट द्यायची असेल तर सातारा शहरातून अजिंक्यतार्याच्या मुख्य दरवाज्यापर्यंत थेट डांबरी रस्ता आहे. वाटेत आपल्याला चार भिंती हे एतिहास्क ठिकाण लागते, त्याला भेट देउन पुढे जायचे. 
पहिला दरवाजा सुस्थितीत असून दोन्ही बुरूज अस्तित्वात आहेत. प्रवेशद्वारावर अनेक देव देवतांची शिल्पे तसेच कमळ , दोन्ही बाजुला आपल्याला शरभ शिल्प दिसतात
महादरवाजाच्या देवड्यांच्या जोत्यावर कोरलेली वाली-सुग्रीव युद्घाची कथा , विघ्नहर्ता गणराय , मारुती आणि बुरुजावर तळवटी खोदलेले नागांचे शिल्पांकन पाहावयास मिळते.दुसरा . दरवाजातून आत शिरल्यावर उजवीकडे हनुमानाचे मंदिर आहे.मोर प्रसारभारती केंद्राचे कार्यालय व मागे दोन प्रसार भारती केंद्राचे टॉवर्स आहेत. हे टॉवर्स म्हणजे दूरदर्शन (१९८६) आणि आकाशवाणी (१९९२) यांची प्रक्षेपण केंद्रे आहेत. पुढे गेल्यावर आपल्याला राजवाड्याच्या पाया आणि भिंतींचा काही भाग शिल्लक भाग दिसतो. याच ठिकाणी महाराणी ताराबाई आणि त्या नन्तर महाराज शाहूंचे वास्तव्य होते.या गडावर पुरातनकालचे मंगळाई देवीचे व हनुमान मंदिर आहे. मंदिराच्या समोरच मंगळाईचा बुरूज आहे. मंदिराच्या आवारात अनेक शिल्प आढळतात. या वाटेने थेट तटबंदीच्या साह्याने पुढे जाणे म्हणजे गडाला प्रदक्षिणा घालण्यासारखेच आहे. उर्वरित गडफेरी पूर्ण करताना अनेक टाक्या आणि तटबंदीचा भाग दिसतो. तसेच एक कोठार सदृश्य बांधकामहि दिसते.वाटेमध्ये , रत्नेश्वराचे मन्दिर दिसते.गडाच्या दक्षिणेला देखील दोन दरवाजे आहेत. मात्र नजरेत भरतो तो गडाचा पश्चिम दरवाजा. गोमुखी बांधणीचे एकामागे एक असे दोन मजबूत प्रवेशद्वार आणि बुलंद बुरुज अजूनही सुस्थितीत आहेत. याबाजुला समोर टेकडी दिसते तीला उंटाची टेकडी म्हणतात. दरवाजापाशी पाण्याचे तीन तलाव आहेत. उन्हाळ्यात मात्र तलावांत पाणी नसते. तटबंदीवरून प्रदक्षिणा मारतांना ते नजरेस पडतात.याशिवाय गडावर तेलातुपाचे रांजण, माचीवर डफळ्यांच्या घोड्यांची पागा, अक्कलकोटकरांचा वाडा, पिंगळ्यांचा वाडा व शेख मिराची घोड्यांची पागा हे शाहूकालीन अवशेष आहेत. 
       गडावरुन पश्चिमेला यवतेश्वराचा डोंगर, बंड्या पठार्,उत्तरेला मेरुलिंगाचा डोंगर आणि मागे पुसट वैराटगड दिसतो.ईशान्येला चंदन-वंदन हे जोड किल्ले,भुताची टेकडी,नांदगिरी उर्फ कल्याणगड्,जरंडेश्वर्,पुर्वेला जानाई-मळाई डोंगर्,पाटेश्वराचा डोंगर आग्नेयेला तर नैऋत्येला सज्जनगड दिसतो. गडाच्या उत्तर अंगाला पायथ्याशी सातारा शहराचे विहंगम दृष्य दिसते.

2)  सापचा एतिहासिक वाडा :-

    सापच्या एतिहासिक वाड्याबध्दल जाणून घेण्यापुर्वी गावाचं नाव साप कसं पडलं? हे माहिती करुन घेउया.तर ' पूर्वी चंद्रागिरी टेकडीजवळ कमंडलू नदीच्या पात्रालगत राजापूर नावाचे गाव होतं. व सध्याच्या साप गावाच्या जागेवर घनदाट जंगल होतं. येथील गुराखी रोज गाई चारण्यासाठी जंगलात जात असे. तिथे एका वारुळातून रोज एक साप बाहेर येऊन गाईचे दूध पित असे. म्हणुन त्या गुराख्याने ते वारुळ खोदून सापाला मारण्याचा प्रयत्न केला. तेव्हा वारुळातून स्वयंभू महादेवाची पिंड निघाली. याठिकाणी गाव वसवावे, असा दृष्टांत झाला आणि त्याठिकाणी जी लोकवस्ती झाली. त्या लोकवस्तीला ‘साप’ हे नाव मिळालं.
      या वाड्याचा  थोडक्यात इतिहास असा, पूर्वी शाहू महाराजांच्या काळी इंद्रोजी कदम म्हणून एक पराक्रमी आणि तालेवार असा सरदार होऊन गेले. तो गावातल्या कदम घराण्याचा प्रसिद्ध असा पूर्वज. लिखित नोंद अशी की इ.स. १७३७ (मार्च) मध्ये बाजीरावाने झील तलाव (दिल्ली) येथें दिल्लीकर मोगलांचा जो पराभव केला, त्या लढाईंत "इंद्रोजी कदम यांसी बोटास गोळी लागोन दोन बोटें उडोन गेलीं.". यावेळी इंद्रोजी कदम हे शिंद्यांच्या दळातील एक मातब्बर सरदार होते.  कदम सरदारांनी आपल्या गावी बांधलेला हा त्यांचा वाडा. सध्याचे त्यांचे वंशज शिंद्याच्याबरोबर उत्तरेत गेल्यावर तिथेच स्थायिक झाले असले तरी वाड्याच्या निमित्ताने त्याचा गावाशी थोडाफार संपर्क आहे. सर्वसाधारण ५ एकर पसरलेला हा वाडा तसा बाहेरून एखाद्या गढीसारखा दिसतो. सहा बुरुज तसेच चारही दिशांची तटबंदी अजूनही सलामत आहे. 
    पूर्वी वाड्यात कोणी रहात नसले तरी गावचा राबता असायचा. सध्या चित्रीकरण वगैरे मुळे वाड्याला चांगले दिवस आल्याने तशी पर्यटकांना प्रवेशबंदी आहे.
  साप गावात येण्यासाठी  रहिमतपूरपासून  अंभेरीमार्गे वडुजकडे जाणर्या रस्त्याने  अपशिंग फाट्यावर उजवीकडे वळायचे किंवा रहिमतपूरपासून औंधच्या दिशेने एक-दीड कि.मी. पुढे पिंपरी फाट्यापासून डावीकडे. पुर्वपरवानगी घेउन हा वाडा आतून पहाता येतो.
         सर्वसाधारण ५ एकर पसरलेला हा वाडा तसा बाहेरून एखाद्या गढीसारखा दिसतो. सहा बुरुज तसेच चारही दिशांची तटबंदी अजूनही सलामत आहे. 
   महा-दरवाजावर हत्तीरोधक खिळे अजूनही व्यवस्थित आहेत. अर्थात दरवाजासोबतच त्यांना दिलेल्या रंगामुळे ते अगदी नव्यासारखे दिसतात. तिथेच असलेल्या छोट्याशा दिंडी-दरवाजातून  आत गेल्यावर मुख्य दरवाजावर असलेला नगारखाना दिसतो
     इथे मुख्य दरवाजातून आत आल्यावर उजव्या हाताला पाग्याची पडझड झालेली जागा दिसते  डाव्या बाजूला हौद रंगाचा हौद म्हणून ओळखतात.. याच्या समोरच एक लाकडी, मोडकळलेली घोड्याची पागा आहे.वाडा दीड मीटर उंचीच्या जोत्यावर बांधला असून पायऱ्यांनी आत गेल्यावर समोर मोठा चौक आहे. मुख्य इमारतीत प्रवेश केल्यावर प्रथमतः समोर वाड्याची चौसोपी रचना दिसते. इथे चारी बाजूस दगडी चौरंग, बैठका या अजूनही आहेत. ओसर्‍यांच्या कोपर्‍यावर पुरुषभर उंचीचे दोन रांजण आहेत. जोत्याच्या मागे खोल्या बांधलेल्या आहेत. यांतील डावीकडच्या एका खोलीत देवघर आहे. सध्या त्यामध्ये देव नसले तरी त्यांचा चौथरा आणि जवळच एक मोठी समई पाहायला मिळते. याच्या बाजूच्या खोलीपलीकडून दुसऱ्या मजल्यावर जाण्यासाठी पायऱ्या आहेत.
 वरती आल्यावर एक प्रचंड मोठा हॉल आहे. त्याच्या छतावर आणि खांबांमधील महिरपीवर नक्षीकाम केलेले आहे. वास्तविक या प्रासादाशिवाय वाड्यामधला कोणताही भाग फार चांगल्या अवस्थेत नाही.  हा वाडा साफ-सफाईच्या दृष्टीने प्रचंड मोठा असला तरी त्याची डागडुजी आणि काळजी ही कामे अगदी व्यवस्थित होतात हे देखील लगेच जाणवते.
        वाड्याच्या मागच्या दारी तुळशी वृंदावनाच्या चौकात बर्‍यापैकी जीर्णोध्दाराचे काम झालेले आहे..वाड्याच्या उजव्या बाजूला मोठी विहीर आहे. बाजूच्या शेताला पाणी देण्यासाठी आजही या विहिरीचा वापर केला जातो. विहिरीमध्ये उतरण्यासाठी पायऱ्याही आहेत. वाड्याच्या भेटीत हि विहीर आवर्जुन पहावी.
वाडा पाहण्यासाठी अर्धा ते पाऊण तास वेळ लागतो. साप गावामध्ये खाण्या-पिण्याची सोय नाही, पण रहिमतपूरमध्ये ती होऊ शकते.

3 ) धोमचे नृसिंह मंदिर : -

        वाईपासून अवघ्या दहा किलोमीटर अंतरावर धोम हे वृक्षदाटीत वसलेलं अतिसुंदर,निसर्गरम्य गाव.सह्याद्रीच्या रांगेने तीनही बाजूने गराडलेले.  स्वातंत्र्योत्तर काळात ईथे कृष्णा आणि वाळकी नदीच्या प्रवाहावर धरण बांधले गेले आणि धोम गावाचे नाव प्रकाशात आले.मात्र पेशवेकालीन मंदिराचा एतिहासिक ठेवा उराशी कवटाळलेले धोम अभ्यासकांना नेहमीच खुणावत राहीले.पुराणकाळातील ‘धौम्य ऋषीं’चे वास्तव्य त्या भागात होते, म्हणून त्या गावाला ‘धोम’ हे नाव पडले असे सांगतात. 
       दगडी तटबंदीने मंदिराचे आवार बंदिस्त केलेले आहे.दोन्ही बाजुला बुरुज्,नक्षीदार कमान आणि वर नगारखाना असलेले प्रवेशद्वार यातून आपण प्राकारात प्रवेश करतो.याठिकाणी शिवपंचायतन साधले आहे. मंदिर उभारणी पाषाणामध्ये केलेली आहे. अर्थात ईथे सर्वाधिक लक्षवेधी काय असेल तर तो मंदिरासमोरचा नंदी. नंदी एकाच पाषाणात कोरलेला सुबक आणि रेखीव व देखणा तर आहेच पण ज्या वास्तुरचनेत या नंदीची उभारणी केली आहे ती कल्पकेतीची कमाल म्हणता येईल. शिवमंदीरआणि नृसिंह मंदिर यांच्या मधोमध, एका कमळाच्या आकृतीच्या पुष्करणीची योजना करून त्यामध्ये बरोबर मध्यभागी अडीच मीटर लांबीच्या दगडी कासवाची निर्मिती करून त्याच्या पाठीवर नंदी उभारला आहे. त्याचे अजून वैशिष्ट्य म्हणजे पुष्करणीमध्ये पाणी सोडले जाते तेव्हा कासव त्याच्या पाठीवर नंदीला घेऊन पाण्यावर तरंगत आहे असा भास होतो. ऊन आणि पाऊस यांपासून संरक्षण होण्यासाठी नंदीच्या डोक्यावर सुंदर नंदीमंडप उभारलेला आहे. तो नंदीमंडपही सुंदर बांधणी केलेला आहे. याचा मागचा विचार असा आहे की कासवी तिच्या पिल्लांना ज्या पद्धतीमध्ये वाढवते त्याप्रमाणे देव त्यांच्या भक्तांना वाढवत असतो!
हिंदु धर्मात निर्माण झालेले पंथ एकत्र रहावेत म्हणून शंकराचार्यांनी एकाच मंदिरात सर्व पंथीयांच्या देवांची मंदिर उभारण्याची संकल्पना आणली,तीच पंचायतन.या मंदिरात शिवपंचायतनामध्ये प्रदक्षिणा मार्गावर सूर्य, गणपती, महालक्ष्मी आणि विष्णू या देवतांची छोटी सुंदर रेखीव मंदिरे उभारली आहेत. या सर्व मंदिरांवर रेखीव नक्षीकाम  केलेले दिसते.
   मुख्य मंदिर शंकराचे असले तरी एका बाजुला एक अनोख्या शैलीचे मंदिर दिसते.हे आहे नरसिंह मंदिर.गोलाकार वास्तु,दोन बाजुला कोनाड्यात असलेल्या मुर्ती आणि वर चढून जायला खडे जीने असा वेगळाच प्रकार ईथे पहायला मिळतो.
यांपैकी पूर्वेकडे जी मूर्ती आहे ती हिरण्यकश्यपू याचा वध करणारी म्हणजे उग्र नरसिंह असून पश्चिमेकडे असलेल्या 'नरसिंह' मूर्तीच्या मांडीवर साक्षात लक्ष्मी बसलेली आहे म्हणजे ;लक्ष्मी नरसिंह. त्या मूर्तीचे वैशिष्ट्य म्हणजे नृसिंहाचे दोन्ही हात हे गुडघ्यावर टेकलेले आहेत. वरील उजव्या हातामध्ये कमळ असून, डाव्या हातामध्ये शंख धारण केलेला आहे. वटारलेले डोळे, गर्जनेसाठी उघडलेले विशाल मुख, त्यातून दिसणारे वरील आणि खालील जबड्यातील आठ दात; तसेच, दातांमधून बाहेर आलेली जीभ अशी ती मूर्ती आणि तिचे भाव जिवंत वाटतात.याचबरोबर ईथे लक्ष्मी नरसिंह यंत्राचा फोटो लावला आहे.
  धोमचे मंदीर पाहून झाले कि गावाच्या मागील बाजुला असलेल्या धोम धरणाच्या भिंतीच्या परिसरात जावे. धोम धरणाची भिंत एका डोंगररांगेच्या आधाराने उभी केली आहे. त्या टेकाडावर चढून जाताच धोमचं अथांग पाणी, डावीकडे पाचगणी, समोर कमळगड व त्याचे म्हातारीचे दात म्हणून ओळखले जाणारे सुळके, उजवीकडे केंजळगड आदी तालेवार ठिकाणे दिसतात.

4 ) आगाशिवची बौद्ध लेणी :-

         कराड हे तालुक्याचे ठिकाण असून ते सातारा जिल्ह्यातील सर्वात प्राचीन शहर आहे. कराड पासून १० कि.मी. अंतरावर आगाशिव डोंगरावर प्राचीन बौद्ध लेणी आहे. प्राचीन बौद्ध लेणी हा कराडचा अनमोल सांस्कृतिक ठेवा आहे. 
         जगाला शांतता व मानवतेचा संदेश देणाऱ्या गौतम बुद्धाच्या हयातीनंतर इ.स. पूर्व २००० वर्षांपूर्वी हिनयान पंथाच्या बौद्ध भिक्कूंनी ध्यान, तपस्या व धम्म प्रचाराच्या निमित्ताने कराडच्या कृष्णा कोयनेच्या प्रीतिसंगमाच्या सान्निध्यात दक्षिण-पश्चिमेस असलेल्या आगाशीव डोंगराचा परिसर निवडून त्या ठिकाणी डोंगरात १०१ गुंफा कोरल्या आहेत. त्यापैकी ६४ चांगल्या स्थितीत अजूनही आहेत. त्यामध्ये ६ चैत्यगृह (प्रार्थनास्थळ) व इतर विहार स्वरूपात आहेत.
श्रावण महिन्यातील तिसर्या सोमवारी या परिसरातील हजारो लोक आगाशिव डोंगरावरील शंकराच्या मंदिरात येतात. त्यावेळी ते या सर्व लेण्यांचेही दर्शन घेतात.बहुतांशी लोक या लेण्या पांडवानी कोरल्या आहेत असे मानतात.  या बौद्ध लेण्या बौद्ध भिक्खुंच्या अभ्यासासाठी व स्वाध्यायासाठी तयार करण्यात आल्या होत्या. परंतु या लेण्या पांडवानी एका रात्रीत कोरल्या आणि त्याही केवळ नखांच्या साह्याने अशा प्रकारचे गैरसमज समाज लोकांच्यात पसरले आहेत. 
हि लेणी तीन गटात कोरलेली बघायला मिळतात..
(१) जखिणवाडीची लेणी : ही एकूण २३ लेणी येथील  
(२) अगाशिवची लेणी: डोंगराच्या एका कड्याच्या उत्तरेकडील बाजूला कोयनेच्या दरीकडे तोंड करून आहेत, ती १९ लेणी.
(३) चचेगाव लेणी, या गटातील लेणी आजूबाजूस विखुरलेली असून कोयना खो-याकडे तोंड करून आहेत. ती एकूण २२ आहेत.
        बरीचशी लहान आकाराची लेणी, स्तंभविरहित चेत्यगृहे व मंडप, सपाट छत, खोदलेल्या खोल्यातील कोरलेले मंचक, स्तूपांचे प्राथमिक स्वरूपाचे आकार, चोकोनी स्तंभयुक्त ओव-या आणि शिल्पविरहितता व अनलंकृतता या सगळ्यांचा संकेत या लेणी ख्रिस्ताब्दाच्या पहिल्या काही शतकातील असावीत असा होतो. या लेणींची समकालीन लेणी पश्चिम महाराष्ट्रात कुडे, जुन्नर, कान्हेरी, महाड इत्यादी ठिकाणीही आहेत. कराड येथील बहुतेक सर्व लेणी निकृष्ट दर्जाच्या अग्निजन्य खडकात कोरलेली असल्यामुळे व मानवी दुर्लक्षामुळे दयनीय अवस्थेत कशीबशी तग धरून उभी आहेत.ठिसूळ नि ओबडधोबड अशा खडकात लेणी कोरलेली असल्यामुळे त्यावर शिलालेख आढळत नाहीत. याला अपवाद म्हणजे क्र. ४७ च्या लेणीतील एक लेख दिसतो. या लेखातील अक्षरवाटिकेवरून तो कार्ले येथील लेखाच्या समाकालीन असावा.
           यातील लेणे क्रमांक १२ हे चैत्यगृहच आहे. त्याचे पुढे तेवढ्याच आकाराचे प्रांगण आहे. नाही. आतील स्तूपाची मोठ्या प्रमाणत पडझड झालेली आहे. गावक-यांनी डागडुजी करून ते पूजार्ह केलेले आहे.इथे दर्शनी बाजूस अर्वाचीन काळात कोरलेली श्री विठ्ठल मूर्ती आहे. लेणे क्र. ४७ मध्ये समोरच्या खोलीत डावीकडील भिंतीच्या वरच्या कोप-यात कराड लेणीतील  एकुलता एक शिलालेख आहे." "गोपाळपुतस संघमित्रस लेणं देवधम". म्हणजे गोपळाच्या संघमित्र नामक मुलाने हे पुण्यप्रद दान दिले आहे. चैत्यगृह (लेणे क्र. ४८) मध्ये स्तूपासमोरच्या बाजूस उजवीकडच्या भिंतीवर एक मनात भरेल अशी शिल्पाकृती आहे. कराड़ें येथे इतक्या मोठ्या संख्येने असलेल्या लेणीत एकही शिल्प आढळत नसताना हे येथील शिल्प सहाजीकच उठून दिसते. या शिल्पपटात तीन व्यक्ती आहेत. त्या थोड्या निसर्गहत (झिजलेल्या) झालेल्या आहेत, त्यामुळे स्पष्टता कमी आहे. यातील डावीकडील पुरुष आकाराने सर्वात मोठा आहे, त्याच्या डोक्यावर समोर मोठी गाठ असलेला फेटा आहे. असे फेटे सातवाहन काळातील अन्य ठिकाणच्या शिल्पांतील तसेच भितीचित्रातील पुरुषांच्या डोक्यावर आढळतात. 
 एकंदरीत सातारा जिल्ह्यातील सातवाहनकालीन ठेवा आवर्जून बघायला हवा.

५ )  परळीचे शिवमंदिरे

सातारा शहराच्या नैऋत्येस ९ किमी. सज्जनगड च्या पायथ्याशी ' परळी ' या गावाच्या बाहेर काही अंतरावर हेमाडपंथी बांधणीची दोन प्राचीन शिवमंदिरे आहेत अभ्यासकांच्या मते त्याची बांधणी यादव काळात १३ व्या शतकात झाली असावी .
शेजाशेजारी असणाऱ्या या दोन शिवमंदिरांपैकी दक्षिणेस असणाऱ्या मंदिराची पूर्णपणे पडझड झालेली आहे. त्यातील फक्त गर्भगृहाचा भाग शिल्लक आहे .याला विरुपाक्ष मंदिर म्हणतात. हे मंदिर बहुधा आधी बांधलेले असावे. याची मोडतोड विजापुरच्या किंवा मोघलांच्या आक्रमणात झाली असावी. 
त्याच्या शेजारी असणारे मुख्य मंदिर मात्र बऱ्यापैकी स्थितीत आहे. त्याची रचना सभामंडप , अंतराळ आणि गर्भगृह अशी आहे . सभामंडप सोळा स्तंभांवर आधारलेला आहे. सभामंडपात दोन देवकोष्टके आहेत, पण ते रिकामे आहेत. याला केदारेश्वर मंदिर म्हणतात. सभामंडपात अत्यंत सुंदर आणि रेखीव नंदी आहे. मंदिराच्या खांबांवर सुंदर अशी शिल्पे कोरलेली आहेत. मंदिराच्या दर्शनी भागावर डाव्या आणि उजव्या बाजूस ' मिथुनशिल्पे ' ( कामशिल्पे ) कोरलेली आहेत.
मंदिरासमोर एक कोरीव मानस्तंभ आहे. त्याचा तुटलेला अर्धा भाग समोरच ठेवलेला आहे. त्याच्या शेजारी एक पंचमुखी शिवलिंग आहे. हे सदाशिवाचे अव्यक्त रूप आहे , सदाशिव म्हणजे सद्योजत , वामदेव , अघोर, तात्पुरुष आणि ईशान या शिवाच्या पाच अवस्था दाखवणारी ही प्रतिमा आहे . या पंचावस्थिती म्हणजे पृथ्वी, आग, तेज, वायू, व आकाश. मंदिराच्या समोरील परिसरात एक मान तुटलेला नंदी आहे.एका चौथर्‍यावर शिवलिंग व शेजारी गणेशाची मुर्ती आहे. 
   शेजारी पुष्कळ वीरगळ शिल्पे आहेत त्यातील अनेक वीरगळ वर नक्षीदार काम केलेले आहे.याच परिसरात अनेक समाध्या आहेत. शेजारी एक सुंदरशी ' पुष्करणी' आहे पण देखभाली अभावी सध्या ती नामशेष होण्याच्या मार्गावर आहे.
 परिसरातील लोकांशिवाय इतरांना फारशी माहिती नसल्याने येथे येणाऱ्या पर्यटकांची संख्या अत्यंत कमी आहे.  ही कोरीव शिल्पे सध्या अनेक पर्यटकांनी केलेल्या विकृत कृत्यांमुळे रंगहिन बनत आहेत. अनेकांनी आपल्या प्रेमीकांची नांवे कोरून यातील अभिजात शिल्पसौंदर्य बिघडविण्याचा प्रयत्न सुरू केला आहे.
    पावसाळ्यात या मंदीरांना भेट दिल्यास या मंदीराबरोबरच उरमोडी धरणाचा जलाशय दिसतो. तसेच परळीमार्गे एक रस्ता पुनवड, नित्रळ मार्गे सांडवली आणि केळवली धबधब्याकडे जाणारी-(पाऊल) वाट आहे. निगुडमाळ गावातून पायवाटेने चालायला लागल्यावर डाव्या बाजूला सांडवलीचा पाच टप्प्यांत पडणारा धबधबा दिसतो. उजव्या बाजूला टेकडी आणि मोठी झाडं असल्यामुळे केळवलीचा धबधबा मात्र दिसत नाही. टेकडीला वळसा घातल्यावरच या धबधब्याचा काही भाग दिसू शकतो. सांडवलीला येणाऱ्या पर्यटकांना सांडवलीबरोबरच केळवली हा धबधबाही पाहता येऊ शकतो. इथे येण्यासाठी योग्य काळ आहे पावसाळा साधारण संपल्यावरच. कारण सांडवलीपेक्षा या ठिकाणी जंगलही अगदी दाट आहे की ज्यातून वाट काढतच जावं लागतं. शिवाय निगूडमाळपासून, सांडवलीपेक्षा, इथे चालावंही बरंच लागतं. या धबधब्याला आवश्यक नसलं तरी पाण्यातून पलीकडे जाण्याचा आनंदही घेता येऊ शकतो. हे थोर्ड धाडसाचं काम आहे खरं, पण पाणी ओलांडताना एक वेगळीच मजा येते. पण हे धाडस करताना योग्य ती काळजी घेणं आवश्यक आहेच.

6 ) नाना फडणवीस वाडा, मेणवली : -

        वाई परिसरातील आवर्जून पहावे असे आणखी एक ठिकाण म्हणजे नाना फडणवीसांनी २४५ वर्षांपुर्वी बांधलेला मेणवलीचा वाडा.वाईपासून सहा किलोमीटर अंतरावर मेणवली हे ठिकाण आहे. या ठिकाणचा घाट आणि नाना फडणवीस यांचा वाडा पेशवेकालीन स्थापत्यकलेचा उत्कृष्ट नमुना आहे.
     या दुमजली व पोटमाळा असलेल्या भव्य वाड्याच्या भोवती दगडी भक्कम भिंत असून सुरवातीला आपल्याला वाड्याचे उत्तराभिमुख भव्य प्रवेशद्वार व नगारखाना दिसतो. शेजारी वाड्याची माहिती व नकाशा दाखवीणारा फलक आहे. या भव्य प्रवेशद्वाराच्या वर नगारखान्याची खोली आहे.त्याकाळी बसवलेल्या दरवाज्यातून आत आल्यावर समोर देवड्या दिसतात.वाडा बघण्यासाठी प्रवेशशुल्क आहे तसेच माहिती देण्यासाठी गाईडची व्यवस्था केलेली आहे,
 वाड्यामध्ये हळदी-कुंकू समारंभ, विहिरीचा, मधला, मुख्य, कांडणसाळीचा आणि स्वयंपाकाचा असे सहा चौक आहेत. प्रत्येक चौकाच्या मध्यभागी एक मिटर खोल कुंड आहेत. या कुंडात जमा होणारे पावसाचे पाणी बंदिस्त मार्गाने फिरविले आहे. त्याचबरोबर वरच्या मजल्यांमधून निचरा होणारे पाणी वाड्याच्या पाठीमागील भिंतीतून बंदीस्त पद्धतीने काढल्याचे दिसते. चौकांच्या योजनेमुळे भरपूर प्रकाश व हवा आपातत: वरच्या मजल्यापर्यंत खेळती राहते.वाड्याच्या मुख्य चौकात.येथे डाव्या व उजव्या बाजुच्या खोल्या म्हणजे धान्याच्या कोठ्या आहेत.सारा रुपाने गोळा झालेले धान्य येथे ठेवले जाई. याच चौकात डाव्या बाजुला श्री गजाननाची छोटी कोरीव मुर्ती आहे, वाड्यात प्रवेश करण्यापुर्वी डाव्या हाताला कोपर्‍यात असणार्‍या बुरुजावरुन नजारा बघायचा. या बुरुजाला जंग्या आणि तोफे डागण्यासाठी खिडक्या कोरल्या आहेत.मात्र सध्या तोफा दिसत नाहीत. या वाड्याच्या चुना, विटांमध्ये बांधलेल्या भिंतीं आतील बाजूला जाड गिलावा दिलेला आहे. भाताचा पेंढा किंवा गवताचे कांडे चिकट लाल मातीच्या चिखलात मिसळून ते मिश्रण लिंपून हा गिलावा तयार केला आहे. भित्तीचित्रणासाठी भिंत सुकविताना पॉलिश करुन गुळगुळीत केली आहे.
येथील चित्रांची मांडणी व रेखाटन मराठी शैलीचे आहे. यामध्ये दशवताराचा, अष्टविनायकाचा समावेश आहे. याच दालनाच्या शेजारी नाना फडणवीस यांचे शेजघर आहे.उन्हाळ्यात वारा घालण्यासाठी हाताने चालवायचा पंखा आपण येथे पाहु शकतो.याच्याच शेजारी खलबतखान्याची छोटीशी खोली आहे.तिथे आता प्रोजेक्टरची व्यवस्था केली आहे. यानंतर आपण जीना उतरुन हळदी-कुंकू समारंभाच्या चौकात येतो. हळदी-कुंकू समारंभाच्या चौकातील भिंतीवर जय-विजय हे द्वारपाल रेखाटले आहेत. तेथे जिवती देवीचे चित्रही आहे. त्याचबरोबर गवळणींच्या खोड्या काढणारा कृष्णही येथे दिसतो. छतातील लाकडात कोरलेल्या सुंदर वेलबुट्टीसही लाल रंग दिला आहे. हा रंग उत्साहवर्धक वातावरण निर्मिती करतो. या ठिकाणी एकाच दगडात घडविलेले अत्यंत सुंदर आणि आकर्षक कमळाच्या फुलाच्या अकारातील कारंजे आहे. हा कारंजा रहाट गाडग्यावर चालविला जात होता. त्याचबरोबर एकाच दगडामध्ये तयार केलेला पाण्याचा कुंडही येथे पहायला मिळतो
 या वाड्याच्या मागे अत्यंत प्रशस्त देखणा, रमणीय आणि उत्कृष्ट वास्तूशास्त्राचा नमुना असणारा कृष्णा घाटही नानांनी बांधलेला आहे.या घाटाच्य दिशेने निघाले कि सर्वप्रथम नजरेस पडतो तो भव्य विस्ताराचा दुर्मिळ असलेला डेरेदार गोरख चिंचेचा वृक्ष.यालाच बॅओबाब म्हणतात. या घाटावर नानांनी बांधलेली पूर्वाभिमुख असणारे लक्ष्मी-वासुदेव म्हणजे मेणेश्वर मंदिराच्या सभागृहाच्या छतावर व गलथ्यावर भित्तीचित्रे शिल्लक आहेत. कृष्णेच्या घाटावरील त्या मंदिरांच्या परिसरात गेले, की सर्वप्रथम एक छोटेसे देऊळ दृष्टीस पडते. ते विष्णू व शंकर यांच्या देवळांच्या मानाने खूपच लहान असून घंटेचे देऊळ म्हणून ओळखले जाते. पंचधातूंपासून बनवलेल्या त्या घंटेचे वजन सहाशेपन्नास किलोग्रॅम एवढे असून, त्यावर लहानग्या जिझसला कडेवर घेतलेल्या मेरीचे चित्र व 1707 हे साल कोरलेले आहे. ती घंटा बघितल्यावर जिझस आणि मेरी यांचे चित्र कोरलेली घंटा देवळाच्या परिसरात का ठेवली, ती एखाद्या चर्चमधील घंटा आहे का, तिच्यासाठी वेगळे मंदिर का बांधले असे  प्रश्न पडतात.  घाटाच्या भिंतीवर कोनाडे आहेत.दिवाळी,त्रिपुरारी पौर्णिमा आणि इतर प्रसंगी ईथे दिवे लावून घाट पाजळले जातात. वाईला गेल्यावर आवर्जून हा वाडा बघावा.

७ ) कल्याणगड उर्फ नांदगिरी

 सातारा शहराच्या पूर्वेला नजर टाकली कि सपाट माथ्याचा,कातळकडे असलेला आणि माथ्यावर एका प्रचंड वृक्षाचा तुरा असलेला डोंगर लक्ष वेधून घेतो.हल्ली या परिसरात मोठ्या प्रमाणात पवनचक्क्यांची उभारणी झाली आहे. शिलाहारकालीन प्राचीन खुणा वागवणारा हा गड आहे कल्याणगड उर्फ नांदगिरी.
     शिलाहार राजा दुसरा भोज याने या किल्ल्याची निर्मिती केली. कल्याणगडावरील गुहेत असणाऱ्या पार्श्वनाथाच्या मूर्तीवरून ह गडा शिलाहारांनी बांधला असावा हे सिद्ध होते. इ.स. १६७३ मध्ये शिवरायांनी सातारा व आजुबाजूचा प्रदेश जिंकून घेतला. त्यातच कल्याणगडाचा देखील समावेश होता. 
साताऱ्यापासून अर्ध्या दिवसात हा किल्ला  पाहून येऊ शकतो. किल्ल्यावर जाण्यास एकच वाट आहे. ही वाट पायथ्याच्या नांदगिरी गावातून वर येते. पवनचक्क्यांसाठी कच्चा रस्ता केल्यामुळे बाईक असेल तर थेट गडमाथ्यापर्यंत जाता येते. नांदगिरी गावातून जाणार्‍या पायवाटेने निघालो कि सुरवातीला काही नव्याने बांधलेल्या पायऱ्या आहेत. सुरवातीच्या पायऱ्या संपल्यानंतर वाट मुरवाड अशी आहे. या वाटेने आपण चढून उजवीकडील डोंगरदांडावर येतो. या मार्गावर दिशा दाखवण्यासाठी पिवळ्या रंगाचे बाण जागोजाग रंगवलेले असल्यामुळे रस्त्यात भरकटण्याची शक्यता नाही. या दांडावर आल्यानंतर अर्ध्याडोंगरात एक कोरलेली गुहा आहे. आत पाच सहा दगडी खांब आहेत. यात सध्या पाणी भरलेले आहे. डावीकडे हनुमानाची प्रतिमा कोरलेली. आतील खांबावर मनुष्यसदृश्य प्रतिमा कोरलेली दिसते. गडाचा खडा चढून माथ्याजवळ आलो कि किल्ल्याची तटबंदी जवळ आलेली दिसते. डाव्या बाजूला किल्ल्यावर जायला रेलिंगची जोड असलेल्या दगडी पायऱ्या दिसतात. किल्ल्यावर जाण्यासाठी उजवीकडच्या दगडी पायऱ्या चढायला सुरुवात करावी. पूर्व बाजूला असला तरी उत्तराभिमुख असा कल्याणगडाचा पहिला दरवाजा आहे   दरवाज्याला लोखंडी दार! एका बाजूला फिरता दरवाजा दिसतो. नांदगिरी उर्फ कल्याणगड तसा आडवाटेवरचा किल्ला! पण या किल्ल्याला भेट देणार्या किल्ले प्रेमी मंडळीपेक्षा भक्त मंडळीच मोठ्या संख्येने असतात.सहाजिकच या सोयी केलेल्या आहेत. दरवाज्यातून आत वळताना समोरच मंदिराकडे जाण्याची खुण दिसते. डावीकडे वळल्यावर एका खोली समोर लेणी अर्थात गुफामंदिराकडे जाण्याचा मार्ग दिसतो. 
        ईथे खरा थरार सुरु होतो. पादत्राणे आणि सॅॅक बाहेरच ठेवावीत.हातात  टॉर्च घ्यावा आणि एक अविस्मरणीय अनुभव घ्यायला सज्ज व्हावे.या गुहेत शिरण्या अगोदर काही काळजी घेणे क्रमप्राप्त आहे. या कड्यातील गुहेचे जे तोंड आहे. याच्यावर आठ दहा फूट ते वीस फूट उंची वर मधमाशांची एक दोन पासून पाच सात अशी पोळी लटकलेली असतात. कांदा – लसूण अथवा धुम्रपान याने मोहोळ उठण्याची शक्यता असते. गुहेमधे पूर्णपणे अंधार आहे. त्यामुळे टॉर्चच्या उजेडातच आत शिरावे लागते. गुहेमधे पाणी आहे. हे पाणी पिण्यासाठी वापरले जाते. त्यामुळे चप्पल बूट बाहेर काढूनच आपल्याला आत जावे लागते. ईथे पुरेसा प्रकाश देणारा टॉर्च सोबत बाळगावा.मोबाईलचा उजेड पुरेसा होत नाही. अगदी एन उन्हाळ्यात देखील ईथे गुढगाभर पाणी असते.तसेच गुहेचे छ्त मध्येच उंच आहे आणि बाजुला त्याची उंची कमी होते.गुहेचे शेवटच्या टोकाला उजवीकडे १००८ व्या पार्श्वनाथांची तपोवस्थेतील काळ्या पाषाणातील मूर्ती दिसते. हि मुर्ती इ.स नवव्या शतकात घडवलेली असून स्थानिक लोक तीलाच 'पारसनाथ' म्हणतात. याशिवाय लेण्यात दत्तात्रेयाची संगमरवरी मूर्ती आणि देवीची मूर्ती आहे. 
लेण्यातील हा थरारक अनुभव सोबत घेउन पुढील किल्ला पाहण्यासाठी निघायचे. गडमाथ्यावर काही पाणतळी दिसतात.या तळ्याच्या काठावर  मंदिर आहे.मंदिरात अनेक देवतांच्या मुर्ती पहण्यास मिळतात.गडमाथ्याच्या मध्यभागी वडाचे मोठे झाड आहे. हेच झाड आपल्याला खुप लांब अंतरावरुन दिसु शकते.
एक थरार अनुभवायला इथे नक्कीच जायला हवे.

८ ) कुबडीतीर्थ रामघळ :-

      राममंदीरामुळे प्रसिध्द चाफळच्या पश्चिमेला एक कातळ टोपी घातलेल्या डोंगर दिसतो.याच डोंगरात रामघळ हि अफलातून जागा आहे. चाफळ राममंदिराला भेट देउन रामघळीला जाण्यासाठी चाफळ-उंब्रज मुख्य रस्त्यावर यावे आणि चाफळकडे न वळता डावीकडे पुढे पाटण-साताऱ्याकडे जाणारा रस्ता धरला. या रस्त्यावर चाफळ पासून फक्त १.५ किलोमीटर अंतरावर गमेवाडी नावाचे गाव लागते. या गावात समोर जाणारा डांबरी रस्ता सोडायचा आणि डावीकडे वळायचे. मग पुढे डेरवण  मधलीवाडी   वाघजाईवाडी  दाढोली अशी छोटी छोटी गावे आणि घाटाचा वळणावळणाचा रस्ता ओलांडत दाढोली गावानंतर साधारण ५०० मीटर अंतरावर डांबरी रस्त्याला डावीकडे एक वळण घेतले. येथे वळणावर सुरवातीलाच "रामघळ कुबडीतीर्थ, सडादाढोली ३ कि.मी." असा बोर्ड लावलेला दिसतो आणि आपण बरोबर रस्त्यावर आहोत याची खात्री पटते. पण इथून पुढे मात्र ३ किलोमीटरचा रस्ता बराच खराब, लाल मातीचा आणि रामघळ ज्या डोंगरात आहे त्या डोंगराच्या कातळटोपीच्या बाजूबाजूने एका मोठ्या सड्यावर (पठारावर) जातो. ह्या रस्त्यावर गाडी अतिशय जपून चालवावी कारण अधेमधे मोठमोठ्या दगडांनी आपली डोकी वर काढलेली आहेत. थोडं सांभाळून गाडी चालवत हा रस्ता पार केला कि पठारावरच्या थंडगार वाऱ्याने आपले स्वागत होते. त्याच्या जवळच दिसते रामघळीची स्वागत कमान. डोंगरकड्याला लाकडी रेलिंग लाऊन आजूबाजूचा डोंगरदऱ्यांनी नटलेला सुंदर परिसर पाहण्यासाठी छान पॉइंट बनवला आहे. येथेच एका उंच दगडावर समर्थ रामदास आणि शिवाजी महाराज यांचा भव्य पुतळा उभा केलेला आहे. साधारण ५० ते ६० पायऱ्या उतरून मुख्य डोंगर आणि त्याच्या शेजारी पडलेल्या एका विशाल शिळेमुळे तयार झालेल्या नैसर्गिक कमानीतून आपण रामघळी समोर येऊन पोहोचतो.ह्या घळीत काही काळ समर्थांचे वास्तव्य होते. घळीतून समोरच चाफळच्या राममंदिराचे दर्शन होते. म्हणूनच बहुदा "दास डोंगरी राहतो, यात्रा रामाची पाहतो' असे म्हटले असावे. सह्याद्रीच्या कुशीत निसर्गरम्य ठिकाणी असलेल्या या घळीत अनुभवता येते ती म्हणजे फक्त आणि फक्त निरव शांतता. इतका पवित्र आणि शांत परिसर कि तोंड उघडून शांतता भंग करण्याची इच्छा देखील होत नाही. घळ दुमजली असून बाहेरूनही दोन मजले स्पष्ट दिसतात. घळीच्या डाव्या हाताला एक मोठे विवर आहे. येथे आत गेल्यावर वर्तुळाकार जागा आहे. हीच समर्थांची ध्यानस्थ बसण्याची जागा. 
       या रामघळी संदर्भात एक कथा सांगितली जाते. सदाशिवशास्त्री येवलेकर नावाचे विद्वान दिवसा मशाली लावून अन जानव्यास सुरी बांधून फिरत होते. आपल्या पांडित्याच्या जोरावर समोर आलेल्या विद्वानाचा पराभव करित त्यांचे भारतभ्रमण सुरु होते.जर वादविवादात पराभव झाला तर मशाल विझवून जानव्याला बांधलेली सुरीने जीभ कापून घ्यायची त्यांची तयारी होती. पण विद्वत्तेच्या अभिमानाचे रुपांतर घमेंडीत झाले. फिरत फिरत हे शास्त्रीबुवा शिंगणवाडीचा डोंगर चढून आले तो शिळा असलेल्या जागी त्यांची भेट समर्थांशी झाली.शास्त्रीबुवांनी तिथेच समर्थांना वादविवादाचे आवाहन दिले.समर्थांनी जवळून जाणार्‍या मोळीविक्याला हाक मारली.समर्थांनी त्याच्या वाटेत काठीने तीन रेघा आखल्या. त्या ओलांडून आलेल्या मोळीविक्याने वादविवादात सदाशिवशास्त्रींचा पराभव केला. पराभव मान्य केलेल्या सदाशिवशास्त्रींना समर्थांनी आपल्या संपद्रायात सामिल करुन घेतले.
  याच परिसरात कुबडीतीर्थ आहे. यासंदर्भात एक कथा अशी सांगितली जाते कि ईथे शिवाजी महाराज आणि समर्थ रामदास यांची भेट झाली,तेव्हा ते दोघे बोलत पुढे गेले असता शिवरायांना तहान लागली. तेव्हा रामदास स्वामींनी हातातील कुबडीने एक दगड उलथवून येथील झर्‍याचे पाणी त्यांना प्यायला दिले.हा झरा अजूनही वाहताच आहे.याला कुबडीतिर्थ म्हणतात. ईथेच एक मारुतीची घुमटी आहे.
  या ठिकाणाला भेट देणाऱ्या पर्यटकांना एक विनम्र सूचना, रामघळीच्या या पवित्र वातावरणास इजा पोहोचेल असे कोणतेही कृत्य करू नये. हे पिकनिक अथवा मौजमजा करण्याचे ठिकाण अजिबात नाही. हा परिसर स्वच्छ व शांत ठेवण्यास मदत करावी. 

९ ) राजेमहाडीक वाडा, तारळे :-

 छ. शिवाजी महाराजांनी बारा मावळातील अनेक सामान्य माणसांना स्वराज्य स्थापनेच्या कामात सहभागी करून घेतले. छत्रपतींच्या नेतृत्वाखाली सामान्य मावळ्यांनी असामान्य पराक्रम केला. अनेक घराणी परकीय आक्रमकांच्या सेवेतून स्वराज्याच्या कार्यात सहभागी करून घेण्यात छत्रपति यशस्वी झाले. अनेकांनी शौर्य, पराक्रम करून आपली स्वराज्यनिष्ठा सिद्ध केली. तिकडे कर्नाटक मधे शाहजीराजांसोबत अनेक इमानी मराठा सरदार आपले योगदान देत होती. त्यातील एक घराणे म्हणजे राजेमहाडिक यांचे होय.
   हरजीराजे महाडिक हे शाहजीच्या सेवेत दाखल झाले होते. शाहजीराजांच्या मृत्यूनंतर हरजीराजे छ. शिवाजी महाराजांच्या मोहिमेत यशस्वी होऊ लागले. छत्रपतींना हरजीराजेंची गुणवत्ता ज्ञात होती. हरजी राजेमहाडीक यांच्या कर्नाटकातील कामगीरीवर खुश होऊन सोन्याची जेजूरी गडावर हरजींना राजेशाही हा किताब सन्मानार्थ देऊ केला.त्यांच्या शूरवीरतेच्या गुणांमुळेच छञपती शिवाजी महाराज यांनी आपली मुलगी अंबिकाराणी यांचा हात विश्वासाने १६६८ ला श्रीमंत सरदार हरजीराजेंच्या हाती दिला व विवाह संपन्न झाला. शाहजी राजांच्या मृत्यूनंतर कर्नाटकातील मराठा सरदारांपैकी निष्ठावान व्यक्तीमधे हरजीराजे हे अग्रभागी होते. कर्नाटकची संपूर्ण जबाबदारी हरजीराजेंच्या नेतृत्वाखाली छ. शिवाजी महाराजांनी सोपविली. हरजीराजेंनी आपल्या पराक्रमाने कर्नाटकातील मुलूख वाढविण्यासाठी फार मोठा पराक्रम करून ते यशस्वी झाले .हरजींनी कर्नाटकचा मुलूख चांगला संभाळला व त्यात वाढ देखील केली.छ. संभाजी राजांच्या दुर्दैवी मृत्यूनंतर राजाराम महाराज गादीवर आले. मोगल महाराष्ट्रात जोर धरु लागल्यावर राजाराम महाराजांना जिंजी जावे लागले. मोगल सरदार झुल्फिकारखान याने जिंजी वेढा दिला होता. यावेळी झालेल्या युद्धात एक तोफेचा गोळा लागल्यामुळे २९ सप्टेंबर १६८९ रोजी वयाच्या एक्केचाळीसव्या वर्षी हरजीराजेंचा स्वराज्य रक्षण करताना मृत्यू झाला. स्वराज्याच्या तीन छत्रपतींची अत्यंत निष्ठापूर्वक सेवा हरजीच्या हातून झाली.
छ.संभाजी महाराजांची कन्या भवानीराणी म्हणजेच छ. शाहू महाराजांच्या भगिणी यांचा विवाह हरजीराजे महाडिकांचे पुत्र शंकराजी यांचाशी झाला. छ. शाहूंनी तारळे ता. पाटण जि. सातारा विभागातील २४ गावची जहागिरी त्यांना दिली. पाटण तालुक्यातील ऐतिहासिक तारळे (ता.पाटण जि. सातारा ) गावात राजेमहाडिकांचे सुमारे तीन एकर क्षेत्रफळावर एकूण आठ वाडे होते, त्यापैकी चार वाडे काळाच्या ओघात नष्ट झाले असून चार वाडे अजूनही उन, वारा, पाऊस यांचा सामना करीत आपल्या पूर्वजांचा वैभवशाली पराक्रम मूकपणे सांगताना दिसतात. वाड्याजवळ असलेले राममंदिर, बारव  पण वैशिष्ट्यपूर्ण आहे. वाड्यामधे आड,तलवार, दांडपट्टे, ढाल, भाले, पालखी अशा विविध गोष्टी पहायला मिळतात.गावाच्या बाहेर नदी संगमावर शंभूराजेंची मुलगी भवानीबाई महाडिक यांची समाधी आहे. प्रत्येक वाड्याचे प्रवेशद्वार आपल्या भव्यतेची जाणीव करून देते. वाड्यात भरपूर ऐतिहासिक सामुग्री आजही पाहण्यास मिळते. यात प्रामुख्याने तत्कालीन शस्त्र, महिलांसाठी असलेले लाकडी मेणे, व्यायामाचे साहित्य, कासवाच्या पाठीच्या ढाली, संदूक, इत्यादी राजेमहाडिकांच्या वंशजांनी फार कष्टाने सुरक्षित ठेवले आहे. भवानीराणीच्या समाधीचे सध्या नुतनीकरण सुरू झाले असून लवकरच तारळे या गावी एक भव्यदिव्य समाधी आपल्याला दिसून येईल.

१० ) शिवकालीन पुल, पार :-

      अवघ्या महाराष्ट्राचं दैवत असलेले छत्रपती शिवाजी महाराजांच्या पराक्रमाच्या गाथा आपण वाचल्या आहेत. महाराजांनी स्वराज्य स्थापना करताना काही सवंगड्यांना हाताशी घेतलं आणि स्वराज्य स्थापन केलं. शिवाजी महाराजांनी फक्त लढाया केल्या नाहीत तर त्यांना दूरदृष्टीसुद्धा होती. सातारा जिल्ह्यातील एक पूल छत्रपती शिवरायाच्या इतिहासाची साक्ष तर देतोच, पण या नव्या युगातील इंजिनीअर्सनाही बोध हि देतो.
  मुसळधार पावसाच्या सरी कोसळणारं सातारा जिल्ह्यातलं जावळीचं खोरं. याच पर्वतरागांमध्ये शिवरायांचा प्रताप सांगणारा प्रतापगड. मुसळधार पावसामुळे इथे कोयनेच्या उगमस्थानाच्या नदीला कायम महापूर. त्यामुळे पावसाळ्यात प्रतापगडाच्या पायथ्याला येताना ही कोयना नदी ओसंडून वाहत असायची.
  या भागातून प्रवास करणं जिकीरीचं असल्यामुळे शिवाजी महाराजांनी या ठिकाणाची पाहणी करुन तत्कालीन पार्वतीपूर या गावात म्हणजे आताच्या पार या गावाजवळ पूल उभारला.  52 मीटर लांबीचा, 15 मीटर उंचीचा आणि आठ मीटर रुंदीचा हा पूल अवघ्या काही महिन्यांत उभारला गेला.
  या पुलाला पाच दगडी खांब आणि चार कमानी आहेत. या पुलामुळे छत्रपतींसह मावळ्यांचा प्रवास पावसातही सुकर झाला. इतिहासाची साक्ष देणाऱ्या या पुलाला ना कोणतं अत्याधुनिक तंत्रज्ञान ना कोणता इंजिनिअर लागला. असा आखीव रेखीव पूल की सध्याच्या टाय घातलेल्या इंजिनीयरांनाही विचार कारायला लावणारा.
  पुलाचा प्रत्येक दगड काटकोनात घडवलेला, तोही एकदम मापात. ज्या बाजूने पाणी या पुलाखाली जाते, त्या प्रत्येक खांबाला धारदार कुऱ्हाडीसारख्या दगडी भिंती. पुरातील पाण्यासोबत आलेलं कोणतंही लाकुड या पुलावर आदळलं तरी त्याचे दोन भाग व्हावेत अशी ही कल्पना. पुरामुळे कोणता ओंडका आदळला तरी पुलाला कोणताच धोका नाही.
  पाणी जाण्यासाठी बनवलेली कमानही मंदिराच्या गाभऱ्यासारखीच. कोरीव काम केलेल्या या पुलाला आज तब्बल साडेतीनशे वर्ष पूर्ण झाली, पण हा पूल आजही त्याच दिमाखात इतिहासाची साक्ष सांगत लोकांसाठी उभा आहे. शिवरायांच्या काळात बांधलेल्या या पुलाचा उपयोग नंतर कोकणात जाण्यासाठी होऊ लागला. कोकणातील सर्व दळणवळणाची कामं याच पुलावरुन होऊ लागली.
  एकीकडे ब्रिटीशांनी बांधलेल्या पुलाची मर्यादा शंभर वर्षांपेक्षा जास्त नाही हे ते स्वतः पत्र पाठवून राज्य शासनाला कळवतात. आपल्या राज्यात बनवलेले अनेक पुल हाताच्या बोटावर मोजण्या इतकी वर्ष झाल्यावर कोसळल्याच्या घटना आहेत. त्यामुळे या शिवरायांच्या काळात बांधलेल्या पुलाकडून सरकारनं बोध घेण्याची गरज व्यक्त केली जात आहे. दरम्यान, छत्रपती शिवाजी महाराजांची दूरदृष्टी किती होती याचं उत्तम उदाहरण म्हणून या पुलाचा आपण उल्लेख करू शकतो.अर्थात हा पूल छत्रपती शिवाजी महाराजांनी बांधला आहे कि नाही यावरून इतिहासकारांमध्ये मतभेद आहेत. 
  अलिकडेच रत्नागिरी-पुणे हा प्रवास कमी वेळात होण्यासाठी खेड-आंबिवली-बिरमणि-हातलोट-पार असा रस्ता मंजुर झाला आहे. तेव्हा या परिसरातील दळणवळण वाढेल आणि मधुमकरंदगड अधिक पर्यटकांचे आकर्षण बनेल. प्रतापगड, महाबळेश्वरच्या भेटीत हा पुल आवर्जून पहावा असाच आहे.

११ ) कात्रेश्‍वर मंदीर, "कातरखटाव':-

       खटाव तालुक्‍यातील कातरखटाव या गावाचे पूर्वीचे नाव कवठे असे होती. कवठेश्‍वर हे या गावचे ग्रामदैवत. पुढे या गावाला कातरपट्टे असे म्हटले जाऊ लागले आणि त्याचा अपभ्रंश कातरखटाव असा झाला. आता हे गाव कातरखटाव या नावाने ओळखला जाते. या गावाच्या नावातील बदलाची दंतकथा सांगितली जाते. कवठेच्या उत्तर बाजूने कवठाई नदी वाहते. हीच नदी पुढे येरळा नदीस मिळते. या कवठे गावात शिवदास नावाचा गवळी हा शंभू महादेवाचा निस्सीम भक्‍त होता. दर सोमवारी शिखर शिंगणापूरच्या महादेवाच्या पायी वारीचा नियम त्याने सोडला नव्हता. अशाच एका सोमवारी भल्या पहाटे शिवदास उठला, पाण्याची कावड घेऊन नदीवर गेला, स्नानसंध्या उरकली, कावड पाण्याने भरली आणि हर हर महादेव म्हणत तो शिखर शिंगणापूरचा रस्ता जवळ करू लागला. कावडीतून आणलेल्या कवठाई नदीच्या पवित्र जलाने शंभू महादेवास अभिषेक केला आणि भक्‍तिभावाने हात जोडले. शिवदासाची भक्‍ती पाहून शंभू महादेव प्रसन्न झाले. ते शिवदासला म्हणाले, तुला काय हवं आहे, ते माग. तेव्हा शिवदास म्हणाला, मला काही नको. फक्‍त तूच मला हवा आहेस. त्यावर महादेव म्हणाले, आता तुला इतक्‍या लांब माझ्यापर्यंत येण्याची गरज नाही. मीच तुझ्याकडे वास्तव्यास येतो; पण एक लक्षात ठेव, तुझ्या गावापर्यंत जाईपर्यंत मागे वळून बघायचे नाही.
शिवदासाने कावड घेतली आणि कवठेचा रस्ता धरला. शिवदास गावापासून हाकेच्या अंतरावर आला आणि त्याच्या मनात शंका आली की, देव माझ्या मागोमाग आले आहेत का? शंका आल्याने शिवदासाने मागे वळून पाहिले असता, कोणीच दिसलेच नाही. शिवदास निराश  होऊन घरी आला. विचार करतच झोपी गेला. झोपेत शंभू महादेवांनी शिवदासास दृष्टांत दिला आणि सांगितले की, तू ज्या ठिकाणी मागे वळून पहिलेस, त्या ठिकाणी मी गुप्त झालो. तेथे तुला शिवलिंग सापडेल. शिवदास खडबडून जागा झाला. तो आपली बैलजोडी आणि नांगर घेऊन शंभू महादेवांनी दृष्टांत दिलेल्या ठिकाणी येऊन थांबला. शिवनामाचा जप करत त्याने जमीन नांगरायला सुरुवात केली. जमीन नांगरत असताना शिवदासाला मोठा आवाज ऐकू आला आणि जमिनीतून रक्‍ताच्या चिळकांड्या उडू लागल्या. त्या क्षणी नांगर सोन्याचा झाला. रक्‍ताचे रूपांतर पाण्यात झाले आणि शिवलिंग वर आले. मात्र, शिवलिंगाची साळुंखी नांगराच्या फाळाने कातरल्याचे दिसले. त्यामुळे शिवलिंगास 'कात्रेश्र' म्हणून संबोधले जाऊ लागले. त्यामुळे कवठेचे नाव कातरपट्टे, असे झाले. पुढे या शब्दाचा अपभ्रंश होत आजचे 'कातरखटाव' झाले. 
       या कातरखटाव गावात एक प्राचीन कात्रेश्वर मंदीर आहे. मुळात या मंदिराभोवती सीमा भिंत होती. मंदिरासमोर पुष्करणी आहे. मंदिराच्या आवारात अनेक वीरगळ आणि शिवलिंग आणून टाकलेले आहेत. मंदिर पूर्वाभिमुख आहे. मंदिर पूर्वाभिमुख असून मंदिराची रचना सभामंडप, अंतराळ व गर्भगृह अशी आहे. मंदीराच्या भिंतीवर असंणार्या कोनाड्यात सध्या असलेल्या मूर्ती चुन्याच्या आहेत. त्यामुळे ह्या मूर्ती नंतरच्या काळात म्हणजे जेव्हा मंदिराचे विटांनी बांधलेले मूळ छप्पर कोसळले आणि त्याची दुरुस्ती झाली तेव्हा बसविलेल्या असाव्यात हे उघड आहे.  या मंदिराचे वैशिष्ट्य म्हणजे इथे असणारा कन्नड शिलालेख. तो देखील भग्न आहे.
मंदिरासमोर चौरस आकाराची एक बारव बांधलेली आहे. ती पुर्णपणे ढासळलेली आहे. मंदिराच्या पुढे असलेल्या मूर्तीशिल्पांपैकी नंदीची मूर्ती उल्लेखनीय आहे. या नंदीवर हे एक बालक नैवेद्याची टोपली ठेवून असल्याचे दाखवले आहे. मंदिराच्या समोर काही वीरगळ आहेत. मंदिराची उत्तर भिंत पडण्याच्या अवस्थेत आहे, त्या बाजूस मातीचा ढिगारा टाकला होता.
  सध्या मात्र या मंदीराचा जीर्णोध्दार सुरु आहे. समोर असलेल्या पुष्करणीची दुरुस्ती केली जात आहे. तळातील गाळ काढून त्यात पुरेसे पाणी भरले जाईल असे पाहिले जात आहे. मात्र मंदीराची दुरुस्ती करताना काळजी घेतली जात नाही. मंदीराच्या शिखरावर असलेली शुकनास काढून टाकली आहे. त्यामुळे मंदीराचे महत्वाचे वास्तु वैशिष्ट्य नाहीसे झाले आहे. अर्थात मंदीर नवीन झाल्यावर कसे दिसेल ? याचे चित्र तिथे न लावल्याने अंदाज येत नाही. अपेक्षा करुया कि मंदीराची मुळ वैशिष्ट्य कायम ठेवून नुतनीकरण होईल.

१२ ) कराडची नकट्या रावळाची विहीर :-

     सातारा तालुक्यातील सर्वात प्राचीन असलेल्या कराड शहराजवळ कृष्णा आणि कोयना नद्यांचा एकमेव प्रीतिसंगम आहे. याच संगमाजवळ पंताचा कोट हे नाव असलेल्या किल्ल्यात एक पायविहीर असून स्थानिक लोक तिला नकट्या रावळाची विहीर या नावाने ओळखतात. विहीर किल्याच्या पश्चिम टोकास असून कोयना नदीच्या पात्रापासून सुमारे २४ मी उंचीवर आहे.विहीर म्हणजे जलस्त्रोताचे जिवंत झरे असतात, तसेच जलसंस्कृतीच्या ठिकाणी जलदेवता व इतर दैवतांचे कोरीव काम साधारणतः सर्व जल उगम व साठा या ठिकाणी हमखास दृष्टीपथास येते, मात्र येथील विहिरीत ना पाण्याचे झरे, ना जलदेवतांच्या कोरीव आकृती. या सर्व गोष्टींचा अभाव असलेल्याने नक्की ही विहीर पाण्याच्या वापरासाठी निर्माण केली होती की इतर उद्देशाने याचा मनात संम्रभ निर्माण होतो. काहींच्या मते शत्रूच्या सैन्यापासून लपून राहण्यासाठी या विहिरीचा वापर होत असावा. कोयनानदीच्या पात्रतातून चुनेगच्ची खापरी जलवाहिकेच्या माध्यमाने येथे पाणी आणले असावे ही शक्यता वाटते, पण इतक्या भल्यामोठ्या विहिरीतील पाणी उपसा करण्यासाठी ना रहाटाचे, ना मोटेचे हौदे असल्याचे पुरावे दिसत नाही.
         विहिरीचा ईशान्य बाजूकडील काही भाग गोलाकार आहे.मात्र उद्देश किंवा उपयोग कशासाठी होत असावा याबाबत अनभिज्ञता आहे. विहीरीच्या आत उतरण्यासाठी ८२ पायऱ्या आहेत. दर २० पायऱ्यानंतर एक मोठी पायरी आहे.  वीस पायऱ्या चढल्यावर किंवा उतरल्यावर विसावा घेण्यासाठी त्या केल्या असू शकतील.पहिल्या वीस पायऱ्या उतरून गेल्यावर विहिरीच्या अंतर्गत तटबंदी बांधकामातून दोन्ही बाजूने एक माणूस विहिरीरच्या हौद्याकडे जाऊ शकेल अशी रचना आहे. जेथे पायऱ्या संपतात तेथे दोन विशाल दगडी स्तंभावर एक मोठी कमान उभारण्यात आली आहे. या कामानीत दोन उपमार्ग आहेत. या विहिरीचे बांधकाम दगडी चिरे आणि चुन्यात केले आहे. नदीच्या बाजूने नंतरच्या काळात विटांनी एक धक्का बांधण्यात आला असावा. विहिरी बाबतची नोंद सन १७५० मध्ये उपलब्ध होती. या विहिरीचा उपयोग केवळ पाणी साठवण्यासाठी होत नसावा. दगडी बांधकामात विशिष्ट अंतरावर सलगपणे खाचा ठेवलेल्या आहेत. त्यामुळे वेळप्रसंगी त्यात मोठ्या लाकडी किंवा लोखंडी तुळया ठसवून या विहिरीचे सहा ते सात मजल्यामध्ये परिवर्तन करणे शक्य होत असावे. आजही काही खाचत लाकडी तुळया दिसून येतात. तसेच त्या त्या टप्प्यावर उतरण्यासाठी जिने ठेवलेले आहेत. याशिवाय विहिरीच्या प्रवेश मार्गांवर मजबूत अशी दगडी भिंत उभारण्यात आलेली आहे. केवळ पाणी साठवण्यासाठी तिचा उपयोग होत नसावा किंवा शेजारची परस्थिती पाहता शत्रूशी लढताना दबा धरून बसण्यासाठी ही जागा वाटत नाही. अनेक मजली असलेली ही विहीर कदाचित महत्वाच्या वस्तूंचा साठा करण्यासाठी कोठार म्हणून उपयोग येत असावी. ही वास्तू केंद्रीय विभागाने सुरक्षित स्मारक म्हणून घोषित केलेली आहे.
कोयना व कृष्णा नदीचा संगम परिसर दर्शनीय आहे. संगमावरील स्व. यशवंतराव चव्हाणांची अष्टाकृती समाधी दर्शनाने समाज जीवनात लोकाभिमुख सामाजिक कार्याची प्रेरणा मिळते. घाटावर असलेल्या मंदिरांची भलीमोठी शृखंला आहे. कराडचे ग्रामदैवत कृष्णामाई मंदिर, काशी विश्वेश्वर मंदिर, कार्तिकस्वामी मंदिर व इतर देवतांच्या दर्शनासाठी नक्कीच एकदा कराडला गेले पाहिजे!

१३ ) धावडशी :-

  श्रीब्रह्मेंद्रस्वामी धावडशीकर हे उपेक्षित कर्मयोगी होते. शाहू छत्रपती, पेशवे, कान्होजी आंग्रे आणि अगदी जंजिरेकर सिद्दीचेसुद्धा गुरू असलेले ब्रम्‍हेंद्रस्वामी हे एक विलक्षण व्यक्तिमत्त्व होते. आयुष्याच्या अखेरच्या काळात स्वामी सातारा या छत्रपतींच्या राजधानीच्या अगदी जवळ असलेल्या धावडशी गावी येऊन स्थायिक झाले. सन १७४५ मध्ये वीरमाडे या गावी ब्रह्मेंद्रस्वामींचे निधन झाले.श्रीब्रह्मेंद्रस्वामी हे छत्रपती शाहू महाराजांचे परम दैवत! त्‍यामुळे त्यांच्या मार्गदर्शनाखाली एक लाख रुपये खर्चून धावडशी गावातील स्वामींच्या समाधिस्थानावर त्यांचे मंदिर उभारण्यात आले आहे.त्यालाच लागून चार बांधीव तलाव आहेत. त्यांचा काळही अडीचशे-तीनशे वर्षांचा असल्याचं सांगितलं जातं. 
परशुरामाचे निस्सीम भक्त असलेल्या या स्वामींनी धावडशीला दोन लाख रुपये खर्चून भार्गवराम मंदिर उभारले आहे. खास मराठा स्थापत्यशैलीचे धावडशीचे भार्गवराम मंदिर मोठे पाहण्यासारखे आहे.  जनावरे आणि माणसांसाठी पाण्याची स्वतंत्र केलेली सोय आवर्जून पाहावी अशी आहे. मंदिरावरील मूíतकाम सुंदर आहेच, पण त्यातही विष्णूचे दशावतार खास पाहण्याजोगे आहेत. मंदिरात परशुरामाची सुंदर मूर्ती असून एक शिलालेखही पाहायला मिळतो. मंदिर उत्तराभिमुख असून, त्याचे प्रशस्त असे तीन गाभारे आहेत आणि पुढे, भव्य असा सभामंडप आहे. मुख्य मंदिर घडीव अशा दगडी उंच चौथऱ्यावर उभारलेले आहे. दगडांच्या सांध्यामध्ये शिशाचा वापर करण्यात आला आहे. मंदिरावर दोन गगनचुंबी शिखरे आहेत. त्यावर दोन उंच कळस आहेत. मंदिरावर सर्व बाजूंनी रेखीव पद्धतीने दशावतार कोरलेले असून, शिखरावर ठिकठिकाणी वेलपत्री नक्षिकाम व पौराणिक रंगीत चित्रे साकारलेली आहेत. त्या चित्रांवरील भावमुद्रा, वेचक प्रसंग व उत्कृष्ट रंगसंगती यांत शिल्पकारांचे व कलाकारांचे कौशल्य दिसून येते. मंदिराच्या पुढील शिखरावर चौकोनी आकाराचे आकर्षक मनोरे आहेत.
श्री परशुराम तथा भार्गवराम. त्यांची काळ्याभोर पाषाणाची रेखीव मूर्ती मंदिराच्या मुख्य गाभाऱ्यात आहे. पेशवाईतील प्रख्यात कारागीर बखतराम यांनी ती मूर्ती घडवली असून तो शिल्पकलेचा उत्कृष्ट नमुना आहे. श्री भार्गवरामाच्या दोन्ही बाजूंस त्यांचे बंधू काळ व काम यांच्या साडेतीन फूट उंचीच्या पितळेच्या सुबक मूर्ती आहेत. त्या मूर्तींना उत्सवमूर्ती असे संबोधतात. मूर्तींसमोर श्रीब्रह्मेंद्रस्वामींची समाधी आहे. श्री भार्गवरामांजवळ दोन टांगत्या समया असून, समाधीजवळ उंच अशा पितळेच्या दोन घाटदार समया आहेत. परिमल, अखंड नंदादीप आणि पूजोपचार यांमुळे गाभारा शांत, निर्मळ, सुगंधी व शुचिर्भूत भासतो. मुख्य गाभारा प्रशस्त असून, त्याच्या प्रवेशद्वारावर उत्तम शिल्पाकृती दगडात कोरलेल्या आहेत. उजेडासाठी दोन्ही बाजूंला दगडात कोरलेल्या जाळ्या आहेत. 
मुख्य मंदिराच्या पुढील बाजूस भव्य सभामंडप असून, त्याचे बांधकाम लाकडी कलाकुसरीचे आहे. शंभर वर्षांपूर्वी मंडपाचे बांधकाम झाले असून, ते उत्तम स्थितीत आहे.   मंडपाच्या पूर्व बाजूंस तळघरवजा दगडी भुयार असून, त्यात शिवलिंग व नंदी अशी दोन दैवते आहेत. शेजारीच, कोपऱ्यात लहानसे जलकुंड असून, भुयारात अतिशय थंड वाटते.
मंदिराच्या परिसरात जुन्या ऐतिहासिक कागदपत्रांची व देवस्थानाची कचेरी आहे. त्या ठिकाणी जवळपास तीनशे वर्षांतील जुनी कागदपत्रे जतन करून ठेवण्यात आली आहेत. कचेरीस लागून मोठे स्वयंपाकगृह असून, हजारोंच्या पंक्ती उठतील अशी मोठमोठी भांडीकुंडी व सर्व सोयी आहेत. समोर भलेमोठे बांधकाम असलेली धर्मशाळा व सुसज्ज असे अतिथिगृह आहे. त्याच धर्मशाळेत उत्सवातील प्रसादपंक्ती होत असत. 
श्रीब्रह्मेंद्रस्वामी धावडशीकर हे महाराष्ट्रायतील जनतेच्या विस्मृतीत गेलेले संत. पण त्यांचे कार्य आणि त्यांचे निस्सीम भक्त यांनी त्यांचे अस्तित्त्व टिकवून ठेवले आहे.

१४ )  दातेगड उर्फ सुंदरगड :-

 पाटण या सातारा जिल्ह्यातील गावाच्या नावाबरोबरच आपल्या डोळ्यासमोर उभे राहते ते कोयना नदीचे विस्तीर्ण व हिरव्यागार विविध निसर्गसंपत्तीचा खजिना असलेले खोरे. या कोयनेच्या खो-यातील सरदार पाटणकर घराण्याचे शिवकाळातील योगदान, कर्तृत्व, पराक्रम, एकनिष्ठता किती महत्त्वाची होती हे इतिहासाने पाहिले आहे.याच पाटण तालुक्याच्या रक्षणासाठी टेहळणी करणारा टोळेवाडीचा 'घेरा दातेगड' किंवा 'सुंदरगड' आहे. 
स्थानिक लोकांच्या मते हा गड शिवाजी महाराजांनी उभारला असे असले तरी हा गड बहुधा शिलाहारांच्या राजवटीत उभारला गेला असावा.अफ़जलखानाच्या वधानंतर छत्रपती शिवाजी महाराजांनी हा गड जिंकून घेतला.शिवकालात गडावर कचेरी व कायम शिबंदी होती. या शिबंदीकरता गडाशेजारच्या गावातील जमिनी नेमून देण्यात आल्या होत्या. छत्रपती शिवाजी महाराजांनी दातेगड पाहताच त्यांच्या मुखातून पहिला शब्द निघाला तो म्हणजे "सुंदर".त्यामुळे दातेगडास सुंदरगड म्हणून देखील ओळखले जाते, अशी समजुत आहे. याचवेळी आदिलशाहीच्या चाकरीत असलेले सरदार चालुक्यवंशीय घराण्यातील पंचसहस्त्री सरदार चांदजीराव पाटणकर हे छत्रपतींचे झाले, स्वराज्याचे झाले. छत्रपति शिवाजी महाराज, छ. संभाजी महाराज, राजाराम महाराज व पुढील काळात देखील या पाटणकर घराण्याने स्वराज्याची एकनिष्ठ सेवा केली. छ. संभाजी महाराजांच्या निर्घृण हत्येनंतर अनेक मातब्बर घराणी सैरभैर होऊन वतनाच्या लालसेने मोगलांच्या बाजूला गेल्याचे इतिहास पुरूषाने पाहिले आहे, मात्र अशा कठीण प्रसंगी सरदार पाटणकर घराण्याच्या वारसदारांनी स्वराज्याची भक्कम साथ सोडली नाही.
या गडावर जायचे तर दोन मार्ग आहेत.  स्वताचे वाहन असेल तर- पाटण शहरातून एक रस्ता चाळकेवाडी पठाराकडे जातो. या डांबरी रस्त्याने प्रवास करताना जवळपास सर्व डोंगर चढून आलो कि भैरवनाथ पोल्ट्री फार्मजवळून एक रस्ता दक्षिणेकडे दातेगडकडे जातो 
 दुसरा मार्ग अर्थातच डोंगरभटक्यांसाठी. पाटण शहरातून ज्ञानोजीराव साळुंखे हायस्कुल जवळून एक पाउलवाट समोर दिसणार्‍या टेकडीवरील दर्ग्याकडे जाते. टेकडीच्या  माथ्यावर दिसणार्‍या मोठ्या आंब्याच्या झाडाच्या दिशेने चढते.इथून थोड्या अंतरावर दातेगड आहे.
       गडाच्या पश्चिमेस असलेल्या किल्ल्याच्या प्रवेशद्वाराच्या खडकात खोदलेल्या पायऱ्या दिसून येतात. दरवाजाची कमान जांभ्या दगडातील आहे. दरवाजाच्या आतील दोन्ही बाजूला सैनिकांसाठी खडकात कोरलेल्या देवड्या आहेत. इथेच गणेशमूर्तीच्या काटकोनात असलेल्या कातळावर दक्षिणाभिमुखी आठ फूट उंचीचे हनुमानाचे रेखीव शिल्प कोरलेले आहे. दातेगडावर खडकात खोदलेली विहीर हेच एक बघण्यासारखे विशेष आहे  तलवार विहीर ५० मिटर लांब, ३ मिटर रुंद तर ३० मीटर खोल असून आत जाण्यासाठी विहिरीस एकूण ४४ पायऱ्या आहेत. यातील काही पायऱ्या तुटलेल्या आहेत.शेवटच्या चार पाच पायऱ्यांच्या डाव्याबाजूस खडक खोदून तयार केलेले शंभू महादेवाचे मंदिर असून आतमधे महादेवाची पिंडी तर बाहेरील बाजूस सुरेख नंदीशिल्प आहे. तेथून वर आकाशाकडे पाहिल्यास आपणांस तलवारीचा आकार सहज दिसून येतो. विहीर बघून गडमाथ्यावर भर्राट वारा खात उभारलो कि समोरच पुर्वेला सडा वाघापुरचे पठार दिसते. या किल्ल्याहून दक्षिणेकडे असलेला मोरगिरी (गुणवंत गड) व कोयनेचा प्रवाह दिसून येतो.
 पावसाळा सरताना या गडावर आल्यास एक अनोखा नजारा दिसतो.गवताची हिरवीगार चादर पांघरलेला गडावर सोनकीच्या पिवळ्या फुलांचा जणु भंडारा उधळलेला असतो. अशा या दातेगडला नक्कीच एकदा भेट द्या, तो तुमच्याशी हितगुज करण्यासाठी कायमच उत्साही आहे.

१५ ) शिरवळची प्राचीन पाणपोयी :-    

   पुण्याहून सातार्‍याला येताना निरानदी ओलांडली की सातार्‍याची हद्द सुरू होते. तिथून पुढे उजव्या बाजूला नायगाव फाट्यावर मोडकळीस आलेल्या मंदिरासारखी वास्तू दिसते. दुर्दैवाने ते मंदिर नसून ती पाणपोई आहे. पाषाणात कोरेलेली ही पाणपोई सुमारे हजार ते बाराशे वर्षे जुनी असून, संवर्धनाअभावी ढासळण्याच्या मार्गावर आली आहे.
     सातारा जिल्ह्याला ऐतिहासिक वारसा लाभला असून, आजही अनेक पुरातन वास्तू, मंदिरे, शिल्प इतिहासाची साक्ष देत उभ्या आहेत.
त्यापैकी एक असलेली शिरवळजवळील पाषाणात कोरलेली पाणपोई. ही पाणपोई सुमारे हजार ते बाराशे वर्षांपूर्वी ‘जकात पिव्हई’ म्हणजे जकात नाक्यावर केलेली असावी. अखंड पाषाणात कोरलेले दोन खांब, त्यामागे घडवलेले मोठे पाषाण एकमेकांवर रचून खोली तयार केली आहे. छतही एकमेकांवर दगडी रचून तयार करण्यात आले आहे. आतमध्ये जमिनीशी समतल दोन रांजण असून ते दगडी आहेत. हे सारे बांधकाम ‘शुषकसांधा’ पद्धतीचे म्हणजे कोणतेही चुना वा सिमेंट सारखे पदार्थ न वापरता करण्यात आले आहे.
   अठराव्या शतकात खंबाटकीच्या खांबटाक्यापासून ते सिंहगडाच्या दरम्यान शिवपर्वानंतर मराठयांनी गनिमांशी बावीस वेळा लढाया केल्या. रावजी पंत चिटणीसांच्या बखरीत या लढायांचे बरेचसे वर्णन आले आहे. तंजावर आणि बेंगलोरच्या मराठी सदरे वर जाताना सैनिकांच्या मोहिमांसाठी शिरवळ गावाच्या हद्दीवर पाणपोई उभारण्याची सूचना दस्तुरखुद्ध श्रीमंत नानासाहेब पेशवे यांनी केली होती. या पाणपोईला सव्वादोनशे वर्षाचा इतिहास असून या पाणपोईची रचना ही हेमाडपंती देवळाच्या धर्तीवर करण्यात आली आहे. या पाणपोईसाठी पगारी सेवक ठेवले जात असत. या पाणपोईत चार हंड्यांची व्यवस्था होती. सातारा-नायगाव-सारोळा-धांगवडी-कामथडी येथे पाणपोयांची रचना अस्तित्वात होती. मात्र शिरवळ हद्दीतील हेमाडपंती शैलीची ही पाणपोई मात्र व विशेष रचनेमुळे येणाऱ्या जाणाऱ्याचे लक्ष वेधून घेई. मात्र हा ऐतिहासिक ठेवा आज देखभालीअभावी दुर्लक्षित आहे.
     सदर पाणपोईची रचना व त्याच्या व्यवस्थेच्या आदेशाबाबतचे लेखी पत्र नानासाहेब पेशवे यांनी शिरवळच्या सरदारांना धाडले होते. या पाणपोई च्या बांधकामासाठी दगड गूळ, चुना, हरभरे, इ. साहित्य पुण्यावरून शिरवळला रवाना करण्यात आल्याचा ऐतिहासिक संदर्भ आहे. पुरातन पाणपोई कोणत्याही प्रकारचा चुना अथवा सिमेंटसारखे पदार्थ न वापरता केवळ गुरुत्वबल वापरून उभारण्यात आली आहे. त्यातील एखादा दगड जरी पडला तरी ही वास्तू पुन्हा आहे तशी उभारणे अवघड आहे. या पाणपोईच्या दगडी एकमेकांपासून वेगळ्या होण्यास सुरुवात झाली आहे.
       पुणे-बेंगलोर महामार्गाच्या सहापदरीकरणाला या पुरातन वास्तूचा अडथळा निर्माण होत आहे. त्यामुळे रस्त्याचे रुंदीकरण करताना या पाणपोईच्या भोवतालीच खोदकाम करून रस्ता तयार करण्यात आला आहे. या खोदकामामुळे पाणपोईची दगडी ढासळण्याची चिन्हे निर्माण झाली आहे. 
      धर्मशाळा बांधणे, पाणपोया उभारणे या संकल्पना कालबाह्य होत चालल्या आहे; पण मानवतावादी, सांस्कृतिक वारशाची साक्ष देणाºया वास्तू वाचविल्या पाहिजेत. त्यामुळे पुढच्या पिढीला किमान त्याची तोंडओळख तरी होईल.

१६ ) अंभेरीचे कार्तिकेय मंदिर

 कार्तिकेय या देवतेबद्दल आपल्याकडे महाराष्ट्रात काहीशी नकारात्मक भावनाच दिसते. अर्थात त्याला कारणेही तशीच आहेत म्हणा. एक तर आपल्याकडे प्रचलित असलेल्या दंतकथा आणि कार्तिकेय या देवतेविषयी फारशी माहिती नसणे, अशी ती दोन कारणे दिसतात. स्त्रियांनी कार्तिकेयाचे दर्शन घेतले तर त्यांना वैधव्य येते ही भावना तर एवढी खोलवर रुजली आहे की, कार्तिकेय या नावाचा उच्चारसुद्धा टाळला जातो. त्याचबरोबर कार्तिकेयाला पार्वतीने दिलेला शाप आणि त्याबद्दलची अजून एक दंतकथासुद्धा जनमानसात रुजलेली दिसते. त्यामुळे फक्त कार्तिकी पौर्णिमा सोडली तर स्त्रिया कार्तिकेयाचे दर्शन अजिबात घेत नाहीत आणि एकूणच या देवतेविषयी उदासीनताच सर्वत्र जाणवते.   
 परंतु वस्तुस्थिती तशी नाही. कार्तिकेयाचे महत्त्व भारतभर जोपासलं गेलं आहे. त्याबद्दल अनेक महत्त्वाच्या कथा पुराणांमध्येही सापडतात. तो देवांचा सेनापती होता, योद्धा होता त्यामुळे विविध ग्रंथांमधून त्याच्याबद्दल आदरयुक्त उल्लेखही पुष्कळ मिळतात. मूर्तीशास्त्राच्या दृष्टीनेसुद्धा कार्तिकेयाच्या मूर्ती खूपच प्राचीन काळापासून आढळून येतात आणि त्यात वैविध्यसुद्धा आढळते. कदाचित स्त्रियांना दर्शन निषिद्ध या दृढ झालेल्या कल्पनेमुळेसुद्धा असेल, पण काíतकेयाची उपासना महाराष्ट्रात फारशी आढळत नाही.
      या सर्व पाश्र्वभूमीवर सातारा जिल्ह्यतील वडुज तालुक्यातले अंभेरी गावचे कार्तिकेय मंदिर आणि तेथील प्रतिमा ही विशेषच म्हणायला हवी. रहिमतपूर-वडुज रस्त्यावर अंभेरी या गावी कार्तिकेय देवस्थान आहे. वडुजकडे जाताना एक छोटासा घाट लागतो. त्याचे नावसुद्धा कार्तिकेय घाट असेच आहे. घाटाखाली दरी आहे. त्या दरीत देवाचे वास्तव्य म्हणून त्या दरीला देवदरी असे सुंदर नाव आहे. वेशीतून आत गेले की अंदाजे एक कि.मी. वर रस्ता संपतो आणि समोरच जीर्णोद्धारित मंदिर दिसते. मंदिराच्या अलीकडे देवदरीवर एक लोखंडी पूल बांधला आहे. त्या पुलावरून पलीकडे वटवृक्षांच्या जवळच पाण्याचे कुंड आहे. जवळच काही समाधी दिसतात. तिथे हातपाय धुऊन मंदिराकडे जाता येते. पावसाळ्यात याच पुलावरून समोर कोसळणारा धबधबा फारच प्रेक्षणीय दिसतो. मंदिरात समोरासमोर दोन गर्भगृहे आहेत. जुन्या गर्भगृहाच्या पायऱ्या उतरून खाली गेले की आत एक शिविपडी दिसते आणि त्याच्या मागे मीटरभर उंचीची (अंदाजे चार फूट) काळ्या पाषाणातील काíतकेयाची अप्रतिम मूर्ती आहे. कार्तिकेयाला इथे एकच मुख असून त्रिभंग अवस्थेतील या मूर्तीला अंदाजे बारा हात आहेत. देवाच्या उजव्या बाजूला खाली मोर असून त्याचा लांबसडक पिसारा डाव्या पायाच्याही पुढेपर्यंत आला आहे. पायापासून ते त्याच्या उजव्या खांद्यापर्यंत असलेला भाला (शक्ती) इथे फारच सुबकतेने अंकित केलेला आहे. डोक्यावर जटामुकुट असलेली ही डौलदार अशी प्रतिमा आवर्जून पाहण्यासारखी आहे. इतकी सुंदर प्रतिमा इथे कशी आली याबाबत मात्र काहीच माहिती मिळत नाही. स्थानिकांच्या मते वर्षांनुर्वष ही मूर्ती इथेच असल्याचे सांगितले जाते. याच मूर्तीशेजारी एक सहा तोंडांची अंदाजे पाऊण मीटर उंचीची अजून एक कार्तिकेयाची छोटी मूर्ती ठेवली आहे. ती मात्र बरीच अलीकडच्या काळातली वाटते. बारा हात असलेल्या या मूर्तीच्या हातात विविध आयुधं दिसतात; पकी उजव्या खालच्या हातातली गदा आणि डाव्या हातात धरलेले धनुष्य ही आयुधं प्रकर्षांने ठसठशीत आहेत. कमरेला धोतर नेसलेली ही प्रतिमा आहे. याच देवळातील दुसऱ्या गर्भगृहात अगदी नवीन संगमरवराची एकाच तोंडाची कार्तिकेयाची मूर्ती आहे. श्रावणातल्या पहिल्या सोमवारी आणि कार्तिकी पौर्णिमेला इथे मोठी यात्रा भरते. हा सबंध परिसर वटवृक्षांनी आणि झाडीने वेढलेला आहे. अर्थात महाराष्ट्रातील ठाम समजुतीनुसार इथे सुद्धा स्त्रियांना प्रवेश नाही. जिथपर्यंत गाडी जाते तिथून पुढे हा प्रवेशबंदीचा नियम आहे. परिसरात काही वीरगळसुद्धा ठेवलेले आढळतात.
कार्तिकेय महाराष्ट्रात एका अनगड जागी वसला आहे. ते ठिकाण नितांत रमणीय आहे आणि त्याहीपेक्षा त्या कार्तिकेयाची मूर्ती फारच देखणी आहे. या ठिकाणी मुद्दाम भेट देण्यायोग्य हे स्थान अल्पपरिचित असले तरी तिथे जाऊन त्याचा परिचय करून घेतला पाहिजे, तसेच तिथल्या शांततेचा अनुभव आवर्जून घेतला पाहिजे.

१७ ) वाठार निंबाळकर

सातारा जिल्ह्यातील फलटण तालुक्यातील एकाच गावातील १० भव्य वाडे असलेले गावं म्हणजे "वाठार निंबाळकर". इतिहास, जूने वाडे व त्याची वास्तूरचना यामधे ज्यांना रस आहे त्यांनी एकदा तरी या गावाला भेट द्यायलाच हवी. महाराष्ट्रांतील राजघराण्यांत फलटणचे निंबाळकर घराणे फार जुनें असून सुमारे साडेसातशें वर्षापासुन हे घराणे महाराष्ट्रात आहे. वाठार गाव छत्रपती शिवरायांच्या काळापासून अस्तित्वात असुन छत्रपती शाहूराजे यांनी या गावची निमपाटीलकी भोईटे घराण्याला दिली होती. आदर्की खुर्द हे निंबाळकर घराण्याची पाटीलकी असणारे गाव होते.सन १७७१ नंतर कुशाजी निंबाळकर यांच्या काळात ही बांधकामे झाली आहेत.
वाठार निंबाळकर येथील राजे नाईक निंबाळकर यांची किल्लेवजा गढी महाराष्ट्रात असलेल्या इतर सर्व गढीपेक्षा खूपच वेगळी आहे. येथे केवळ एक स्वतंत्र गढी नसुन तटाबुरुजांनी सजलेल्या सहा स्वतंत्र गढ्या व दोन मंदिरे असुन हि सर्व ठिकाणे एका मुख्य तटबंदीच्या आत साधारणपणे २७ एकर परीसरात सामावली आहेत. गढीच्या पश्चिम भागात असलेल्या नदीवर बंधारा घालुन नदीचे पाणी अडविल्याने पश्चिमेकडून गढीला नैसर्गीक खंदक लाभला आहे. यामुळे गढीची अर्ध्यापेक्षा जास्त तटबंदी सुरक्षित झाली आहे.गढीचे तटबंदी बुरुजाचे बांधकाम व भव्य दरवाजा आजही या वास्तुच्या भव्यतेची साक्ष देतात.  गढीचा दगडी बांधणीतील उत्तराभिमुख कमानीदार दरवाजा २०-२२ फुट उंच असुन याच्या लाकडी दारावर अणकुचीदार खिळे ठोकले आहेत. दरवाजातून आत शिरल्यावर सर्वप्रथम उजवीकडील तटबंदीत असलेले राममंदिर पाहुन घ्यावे. हे मंदिर म्हणजे मध्ययुगीन मंदिर स्थापत्याचा उत्तम नमुना आहे. मंदिराच्या आतील भागात दोन शिलालेख असुन सभामंडपातील लाकडावरील कोरीवकाम व चित्रकला अतिशय सुंदर आहे. कडे निघावे. कोटात असलेल्या ६ गढीपैकी मुख्य गढी हि आकाराने सर्वात मोठी असुन इतर गढीच्या मानाने आजही सुस्थितीत आहे. चौकोनी आकाराच्या या गढीत चार टोकाला चार तटबंदीच्या मध्यभागी प्रत्येकी एक व दरवाजा शेजारी दोन असे एकुण ९ बुरुज असुन हि गढी नऊ बुरुजांचा वाडा म्हणुन ओळखली जाते. बाकीच्या गढ्या चांगल्या स्थितीत नसल्या तरी पाचवी गढी पहायला मिळते. हि गढी आजही तिच्या मूळ स्वरुपात जतन केलेली असुन एक निंबाळकर परीवार तेथे वास्तव्यास आहे. गढीत राहत असल्याने आत मर्यादित प्रवेश दिला जातो. या गढीच्या आवारात दोन लहान मंदिरे असुन त्यावरील कळस मात्र चुन्यात बांधले आहेत.  या वाड्याचे  मूळ पाया व रचना कायम ठेवून अतिशय सुंदर नुतनीकरण केलेय! तेही पाहण्यासाठी सकाळी काही वेळासाठी संध्याकाळी ४ ते ६ या वेळेत त्यांनी उपलब्ध केलेय. तेही ज्यांना वास्तू रचनेत रस आहे त्यांनी पहायला हवी अशी बाब आहे. 
संपुर्ण कोट व सहा गढी पहाण्यास तीन तासापेक्षा जास्त कालावधी लागतो पण गढी या प्रकारात वेगळे काही पाहिल्याचे समाधान मनाला मिळुन जाते.
एकंदरीत दुर्गप्रेमींबरोबर ज्यांना पुरातन वास्तुशास्त्रात रस आहे त्यांनी किंवा मराठेशाही कालातील बांधकाम शैलीच्या अभ्यासकांनी आवर्जून भेट द्यावे असे हे ठिकाण आहे.गड्,किल्ले म्हणले कि बहुतेकांना डोंगरी गड बघण्यात रस असतो.तरीही हे असे भुईकोट आपल्याला एका वेगळ्या विश्वात घेउन जातात.वेळ काढून अश्या ठिकाणी भेट द्यावी आणि इतिहासात हरवून जावे.

१८ ) मोरबागची मोरघळ : -

   जशी चाफळजवळची हि रामघळ तशीच समर्थांच्या स्मृती बाळगणार्‍या सज्जनगड उर्फ परळीच्या किल्ल्याच्या परिसरात आणखी एक घळ आहे, मोरघळ.मात्र रस्त्याची अवस्था विचारात घेता या परिसरात पावसाळ्यात न येणच योग्य ठरेल. ईथे रस्ते खचण्याचे प्रमाणही जास्त आहे, त्यामुळे दिवाळी ते मे महिना हाच ईथे येण्याचा योग्य कालावधी. आपण सज्जनगडाकडून ठोसेघरकडे येताना उजव्या हाताला एक डांबरी सडक पांगारे गावाकडे जाते. डांबरी रस्ता पांगारे गावापर्यंतच आहे. पुढे कच्चा रस्ता पळसवडे गावाकडे जातो. पळसवडे गावाच्या अलिकडे एक कच्चा गाडीरस्ता डाव्या हाताला जातो. हा रस्ता मोरबाग या धनगरवस्तीकडे जातो. मात्र मोरबाग येण्याआधीच छोटी पायवाट डावीकडे जाते. हि वाट शेताच्या कडेकडेने चढून एका तीन मुखांच्या गुहेकडे पोहचते. हिच आहे समर्थांनी तप केलेली "रामघळ".गुहेच्या बाहेरच भगवा ध्वज फडकत असतो. बाहेरुन एकच मुख दिसत असले तरी आतुन या गुहेचे तीन भाग पडलेले आहेत. पैकी मधल्या भागात थोडे वीट बांधकाम करुन काही देवांच्या मुर्ती व नंदी ठेवले आहेत. ईथे मागे गेल्यास आणखी चिंचोळी झालेली गुहा दिसते. याच्या आत सरपटत जाण्याचा प्रयत्न केला, तर पुढे बर्‍याच गुहाचे जाळे आहे असे लक्षात येते. मात्र साप, विंचवासारख्या प्राण्यांचे भीती आणि पुरेशी तयारी नसल्याने ईथेच थांबणे योग्य. उजवीकडे असलेली गुहा चिंचोळी झाल्यामुळे फार पुढे जाता येत नाही.डाव्या बाजुला छोटी गुहा असुन आतमधे वटवाघळे आहेत.  एकुण रामघळ पहाणे एक थरारक अनुभव आहे. सर्वांनाच कदाचित शक्य होणार नाही, पण साहसी मंड्ळीनी त्याची जरुर अनुभुती घ्यावी.मोरबाग या गावातुन पुढे सांडवली या गावी कच्चा रस्ता जातो, व सांडवलीतुन आपण आणखी एक धबधबा पाहु शकतो, पण ईतकी गैरसोय सहन करुन जाण्यापेक्षा केळवलीकडून हा धबधबा पहाणे सोयीचे.


































Friday, March 20, 2026

सातारा आकाशवाणी ( अंतिम )

1 ) अजिंक्यतारा किल्ला

 पुणे-बेंगळूरू महामार्गावरुन प्रवास करताना पुण्यातून कराड-कोल्हापुरकडे निघालो कि लिंब खिंड ओलांडल्यबर अफाट पसरलेल्या सातारा शहराचा नजारा दिसतो आणि पार्श्वभुमीवर एखाद्या रक्षकासारखा उभारलेला एक गिरीदुर्ग डो़ळ्यात भरतो. हा आहे सातारचा किल्ला उर्फ अजिंक्यतारा ! आज याचीच आपल्याला माहिती जाणून घ्यायची आहे.
     अजिंक्यतार्याच्या इतिहासात डोकावल्यास  कोल्हापूरच्या शिलहार वंशीय दुसºया भोजराजाने इ. स. ११९० मध्ये हा किल्ला बांधला. शिलाहार भोज राजाने किल्ला बांधला तेव्हा एका  मुलगा व मुलगी यांना ईथे बळी दिले असे सांगतात. मात्र फेरिस्ता हा इतिहासकार लिहीतो कि चौथा बहामनी राजा महंमदशहा( इ.स. १३५८-१३७५) याच्या कारकीर्दीत सातारचा किल्ला बांधला गेला.साताऱ्याचा प्रथम लिखित उल्लेख या पत्रव्यवहारात आढळतो. मात्र कदाचित त्याने ह्या किल्ल्याची पुनर्बांधणी केली असावी.
शिलहाराकडून देवगिरीच्या यादववंशीय सिंधन राजाने हा गड जिंकून घेतला.पुढे बहामनी राजाकडून  विजापूरच्या अदिलशहाने हा किल्ला जिंकून घेतला. किश्वरखान ह्या सरदाराने पहिल्या आदिलशाहची  विधवा बेगम चांदबीबी ही निजामशाहशी संगनमत करीत असल्याच्या संशयावरून तिला सन १५८२ च्या दरम्यान सातारा किल्ल्यात कैदेत ठेवले . परंतु त्याच वर्षी किश्वरखानाचा पाडाव झाल्याने तिची सुटका झाली. या किल्याचा उपयोग पूर्वी तुरुंगासारखाच केला जाई. १६५९ मध्ये छत्रपती शिवाजीमहाराजांनी हा किल्ला जिंकला. त्यानंतर मोगली अक्रमणांमुळे छत्रपती शिवाजीमहाराजांनी तह करून हा किल्ला मोगलांना दिला. १६६६ नंतर हा किल्ला विजापूरांकडे गेला.मात्र छत्रपती शिवाजीमहाराजांनी हा किल्ला जिंकून ताब्यात घेतला. छत्रपती शिवाजीमहाराज १ डिसेंबर १६७६ पासून २५ जानेवारी १६७७ पर्यंत वास्तव्य करून होते.शिवरायांना अंगी ज्वर आल्याने दोन महिने विश्रांती घ्यावी लागली. कर्नाटक मोहिमेच्या आधी १६७५ मध्ये ते आजारी पडले असताना त्यांचा दोन महिने या किल्ल्यात मुक्काम होता. याच काळात रघुनाथ हणमंते त्यांना भेटले आणि कर्नाटक मोहिमेची योजना निश्चित झाली.
       यानंतर या गडाच्या इतिहासातील महत्वाचा प्रसंग म्हणजे औरंगजेबाने स्वराज्यावर जे आक्रमण केले त्याकाळातील ! 
   यानंतर या गडाच्या इतिहासातील महत्वाचा प्रसंग म्हणजे औरंगजेबाने स्वराज्यावर जे आक्रमण केले त्याकाळातील ! परंतु  शिवाजी महाराजांचीचे अकाली निधन, मग धर्मवीर संभाजीचे हौताम्य, शिवस्नुषा येसूबाई व युवराज शिवाजी उर्फ शाहूची कैद या दरम्यान आलमगिर औरंगजेबाच्या आक्रमणाला तोंड देण्यास मराठा साम्राज्याचे छत्रपती म्हणून राजाराम महाराज सिंहासनाधिष्ठित झाले. पण बलाढ्य मोगली सैन्याला तोंड देण्यासाठी राजाराम महाराजांनी आपली राजधानी सातारा शहरानजीकच्या किल्ल्यावर आणली. यावर चवताळलेल्या औरंगजेबाने  या नव्या राजधानीचा घोट घ्यायचे ठरवले. रायगडाचा इस्लामगड करून हा औरंगजेब सातारा शहरात दाखल झाला. त्याच्या समोर उभा होता अवघ्या तीनशे मीटर उंचीचा 'किल्ले सातारा' ! 
           औरंगजेबाची छावणी करंज गावात होती. मोगल सैन्याने गडावर तोफांचा मारा सुरू झाला. पण गडावर किल्लेदार होते थेट शिवरायांपासून  स्वराज्यनिष्ठ असलेले.रयागजी प्रभू  !
      हा चिमुकला किल्ला आठवडाभरात ताब्यात घेउ अशी दिवास्वप्न बघाणाऱ्या औरंगजेबाची निराशा वाढत चालली. तो रुसून करंज्याला जाऊन बसला. मोगलांच्या छावणीत उदासी पसरली. त्याचवेळी शहाजादा आजम उर्फ अझ्झमच्या डोक्यात एक कल्पना आली. त्याने ती तर्बियतखानला बोलून दाखविली. दोघेजण आलमगिरीकडे गेले.  त्यांच्या योजनेप्रमाणे एके दिवशी खासा औरंगजेब पालखीत बसून गडाच्या पायथ्याकडे वाजत गाजत निघाला. ही कसली गडबड म्हणून मावळेही तटावर जमले. बादशहाने पालखीचा गोंडा सोडला व तो खाली उतरला आणि इशारत झाली.
काय होतंय ते कळायच्या आत कानठळ्या बसवणारा आवाज झाला अन् मंगळाईचा बुरूज आकाशात भिरकावला गेला. खुद्द किल्लेदार प्रयागजी प्रभूही त्यातून सुटू शकले नाहीत.त्यांच्या अंगावर दगडधोंड्याचा आणि मातीचा ढीग पडून त्यात ते गाडले गेले. आरडाओरडा, किंकाळ्यांनी काहीही कळत नव्हते. झाले असे होते कि मोगल सैन्याने गुपचुप जमीनीखालून बोगदा खणून तो मंगळाईच्या बुरुजाखाली नेला होता आणि त्यात दोन सुरुंग पेरले होते, त्यातील एक सुरुंग फूटला आणि मंगळाईचा बुरुज उध्वस्त झाला. हर्षातिरेकाने हजारो मोगल सैनिक त्या दिशेने धावू लागले आणि इतक्यातच दुसराही आवाज झाला. डोंगर चढणारे दोन हजार मोगल सैन्य या दुसऱ्या सुरुंगाच्या स्फोटात गारद झाले. अंगावर पडलेले दगड गोटे बाजूला सारल्यावर प्रयागजी प्रभू जिवंत बाहेर पडले. एक फत्तर जो उडाला तो थेट औरंगजेबाच्या पायाशी पडला. बादशहा थोडक्यात वाचला, नाहीतर साताऱ्याचेच औरंगाबाद नाहीतर खुल्ताबाद झाले असते. आपल्या पुत्राची ही करामत पाहून बादशहाची स्वारी गरम झाली व तो परत छावणीत गेला.
 काही दिवसांनी शाही छावणीत आनंदोत्सव साजरा झाला कारण छत्रपती राजाराम महाराजांचे सिंहगडावर देहावसान झाले होते. दिल्लीपतीला आभाळ ठेंगणे झाले. पण कसले काय! हिम्मतबहाद्दर प्रयागजी प्रभू मूठभर मावळ्यांसह किल्ला लढवीतच होते. अखेर दाणागोटा संपला, दारूगोळा संपला तेव्हा शरणागती पत्करावी लागली. ह्या शौर्यापुढे बादशहा खचला. एकेक किल्ला घेण्यासाठी आलमगिराला तीनशे साठ वर्ष लागतील शिवछत्रपतींचे वाक्य सार्थ ठरले. या किल्ल्यावर शाहजादा आझमने निशाण चढवले म्हणून त्याचे नामांतर झाले -'अझमतारा.' ही गोष्ट एप्रिल १७०० मधील.
थोड्याच दिवसांत जिंजीहून एक नकल्या शाहीर गंमती जंमती करीत खुद्द गडावर येऊन पोहोचला. काही गवतवाले, हमालदेखील ये-जा करू लागले. ह्या अण्णाजीपंत शाहीराने, ताराराणीच्या वेषांतर केलेल्या सैनिकांच्या मदतीने एक दिवस किल्लाच ताब्यात घेतला. अन् अझमताऱ्याचा झाला 'अजिंक्यतारा !'
 अश्या या इतिहास प्रसिध्द अजिंक्यतारा गडाला भेट द्यायची असेल तर एकदम सोपे आहे. सातारा शहरातून अजिंक्यतार्याच्या मुख्य दरवाज्यापर्यंत थेट डांबरी रस्ता आहे. वाटेत आपल्याला चार भिंती हे एतिहास्क ठिकाण लागते, त्याला भेट देउन पुढे जायचे. सातार्‍यातून ज्या मार्गाने आपण गडावर प्रवेश करतो त्यामार्गावर दोन दरवाजे आहेत. आजही या दोन दरवाजांपैकी पहिला दरवाजा सुस्थितीत आ.हे दरवाजाचे दोन्ही बुरूज अस्तित्वात आहेत. प्रवेशद्वारावर अनेक देव देवतांची शिल्पे तसेच कमळ कोरलेले आहेत. दोन्ही बाजुला आपल्याला शरभ शिल्प दिसतात. रेखीव रचना आणि कोरलेल्या शिल्पांमुळे दरवाजा खूप सुंदर दिसतो.  
  गडकिल्यावर प्रवेश करायचे असेल तर मुख्य प्रवेशद्वाराशिवाय पर्याय नसतो.कारण चहूबाजूने गडाला भक्कम आशा तटबंदीने बंदीस्त केलेलं आढळते.गडाचे प्रवेशद्वार आणि तटबंदी त्याच्या भक्कमतेची साक्ष देतात. द्वार जितके भक्कम तितकाच गड ही भक्कम!!! म्हणूनच गडाची तटबंदी आणि द्वारे विशेष पद्धतीने बनवलेली दिसतात. ती बनविताना जो नाजूक भाग असतो त्यावर सहसा प्रहार होणार नाही किंवा तो लक्षात येणार नाही याची पुरेपुर दक्षता घेतलेली असते.
प्रवेशद्वारातून आत प्रवेश केला की उजव्या हाताला सैनिकांच्या बैठकीच्या खाली दोन डोकी, पंख आणि चार पाय असणारे शिल्प आढळते  महादरवाजाच्या देवड्यांच्या जोत्यावर कोरलेली वाली-सुग्रीव युद्घाची कथा , विघ्नहर्ता गणराय , मारुती आणि बुरुजावर तळवटी खोदलेले नागांचे शिल्पांकन पाहावयास मिळते.
थोडे वर चालून गेल्यावर  दुसरा दरवाजाने गडावरती दाखल होतो. दरवाजातून आत शिरल्यावर उजवीकडे हनुमानाचे मंदिर आहे. हे मंदिर राहण्यास उत्तम आहे, गडावर अनेक पाण्याच्या टाक्या आहेत मात्र पाणि पिण्यायोग्य नाही. दरवाजातून आत शिरल्यावर डावीकडील सरळ रस्त्याने पुढे गेल्यावर वाटेत महादेवाचे मंदिर लागते. समोर प्रसारभारती केंद्राचे कार्यालय व मागे दोन प्रसार भारती केंद्राचे टॉवर्स आहेत. हे टॉवर्स म्हणजे दूरदर्शन (१९८६) आणि आकाशवाणी (१९९२) यांची प्रक्षेपण केंद्रे आहेत. पुढे गेल्यावर एक डावीकडे जाणारी वाट दिसते व " मंगळादेवी मंदिराकडे " असे तिथे लिहिलेले आढळते.  
पुढे गेल्यावर आपल्याला राजवाड्याच्या पाया आणि भिंतींचा काही भाग शिल्लक भाग दिसतो. मात्र सद्य स्थितीवरूनही राजवाड्याच्या भव्यतेचा अंदाज लावता येऊ शकतो. ह्याच ठिकाणी मोघल बादशहा औरंगजेबलाही पुरून उरलेल्या महाराणी ताराबाई आणि त्या नन्तर महाराज शाहूंचे वास्तव्य होते.सन १८४४ साली तो छत्रपती प्रतापसिंह महाराजांचे ताब्यात आला. या गडावर पुरातनकालचे मंगळाई देवीचे व हनुमान मंदिर आहे. अजिंक्यताºयातील जो पडीक राजवाडा आहे तो कै. छत्रपती शाहू महाराज यांनी बांधलेला आहे. दिल्ली सुटकेनंतर त्यांनीच सातारला महत्व प्राप्त करून दिले.  येथे एक कोठारही आहे.
 मंदिराच्या समोरच मंगळाईचा बुरूज आहे. मंदिराच्या आवारात अनेक शिल्प आढळतात. या वाटेने थेट तटबंदीच्या साह्याने पुढे जाणे म्हणजे गडाला प्रदक्षिणा घालण्यासारखेच आहे. उर्वरित गडफेरी पूर्ण करताना अनेक टाक्या आणि तटबंदीचा भाग दिसतो. तसेच एक कोठार सदृश्य बांधकामहि दिसते.वाटेमध्ये , रत्नेश्वराचे मन्दिर दिसते.गडाच्या दक्षिणेला देखील दोन दरवाजे आहेत. तटबंदीवरून प्रदक्षिणा मारतांना ते नजरेस पडतात. या दरवाजात येणारी वाट सातारा-कराड हमरस्त्यावरून येते.  मात्र नजरेत भरतो तो गडाचा पश्चिम दरवाजा. गोमुखी बांधणीचे एकामागे एक असे दोन मजबूत प्रवेशद्वार आणि बुलंद बुरुज अजूनही सुस्थितीत आहेत. याबाजुला समोर टेकडी दिसते तीला उंटाची टेकडी म्हणतात. दरवाजापाशी पाण्याचे तीन तलाव आहेत. उन्हाळ्यात मात्र तलावांत पाणी नसते. याशिवाय गडावर तेलातुपाचे रांजण, माचीवर डफळ्यांच्या घोड्यांची पागा, अक्कलकोटकरांचा वाडा, पिंगळ्यांचा वाडा व शेख मिराची घोड्यांची पागा हे शाहूकालीन अवशेष आहेत. गडावरुन पश्चिमेला यवतेश्वराचा डोंगर, बंड्या पठार्,उत्तरेला मेरुलिंगाचा डोंगर आणि मागे पुसट वैराटगड दिसतो.ईशान्येला चंदन-वंदन हे जोड किल्ले,भुताची टेकडी,नांदगिरी उर्फ कल्याणगड्,जरंडेश्वर्,पुर्वेला जानाई-मळाई डोंगर्,पाटेश्वराचा डोंगर आग्नेयेला तर नैऋत्येला सज्जनगड दिसतो. गडाच्या उत्तर अंगाला पायथ्याशी सातारा शहराचे विहंगम दृष्य दिसते.

2)  सापचा एतिहासिक वाडा

सापच्या एतिहासिक वाड्याबध्दल जाणून घेण्यापुर्वी गावाचं नाव साप कसं पडलं? हे माहिती करुन घेउया.तर ' पूर्वी चंद्रागिरी टेकडीजवळ कमंडलू नदीच्या पात्रालगत राजापूर नावाचे गाव होतं. व सध्याच्या साप गावाच्या जागेवर घनदाट जंगल होतं. येथील गुराखी रोज गाई चारण्यासाठी जंगलात जात असे. तिथे एका वारुळातून रोज एक साप बाहेर येऊन गाईचे दूध पित असे. एक दिवस त्या गुराख्याने ते वारुळ खोदून सापाला मारण्याचा प्रयत्न केला. तेव्हा वारुळातून स्वयंभू महादेवाची पिंड निघाली. याठिकाणी गाव वसवावे, असा दृष्टांत झाला आणि त्याठिकाणी लोकवस्ती झाली. त्या लोकवस्तीला ‘साप’ हे नाव मिळालं. वारुळात गुराख्याला जी पिंड सापडली त्याठिकाणी तेव्हा मंदिरही बांधलेले आहे. तर पूर्वीच्या राजापूर म्हणजे चंद्रगिरीलगत जुन्या गावचे भग्नावशेष आजही पाहायला मिळतात.  
थोडक्यात इतिहास असा, पूर्वी शाहू महाराजांच्या काळी इंद्रोजी कदम म्हणून एक पराक्रमी आणि तालेवार असा सरदार होऊन गेला. तो गावातल्या कदम घराण्याचा प्रसिद्ध असा पूर्वज. लिखित नोंद अशी की इ.स. १७३७ (मार्च) मध्ये बाजीरावाने झील तलाव (दिल्ली) येथें दिल्लीकर मोगलांचा जो पराभव केला, त्या लढाईंत "इंद्रोजी कदम यांसी बोटास गोळी लागोन दोन बोटें उडोन गेलीं.". यावेळी इंद्रोजी कदम हे शिंद्यांच्या दळातील एक मातब्बर सरदार होते. पुढें रामराजे यांनां बार्शी पानगांवहून आणविण्याकरितां जी पेशव्यांची विश्वासाची मंडळी गेली होती. तीत हे इंद्रोजीहि होते (जानेवारी १७५०). तर या कदम सरदारांनी आपल्या गावी बांधलेला हा त्यांचा वाडा. काहींच्या मते इंद्रोजी आणि खंडोजी (की कंठोजी) कदम यांनी त्याकाळी बांधलेला हा वाडा आहे. बांधणीनुसार तो पुढे-मागे नंतरच्या काळात अजून वाढवलेला असावा असं वाटतं.
सध्याचे त्यांचे वंशज शिंद्याच्याबरोबर उत्तरेत गेल्यावर तिथेच स्थायिक झाले असले तरी वाड्याच्या निमित्ताने त्याचा गावाशी थोडाफार संपर्क आहे.
सर्वसाधारण ५ एकर पसरलेला हा वाडा तसा बाहेरून एखाद्या गढीसारखा दिसतो. सहा बुरुज तसेच चारही दिशांची तटबंदी अजूनही सलामत आहे. १७ व्या शतकापासून कधी युद्धाचा प्रसंग तसाही आला नसावा त्यामुळेही तसेच थोडाफार वापर राहिल्यामुळे तो अजूनही शाबूत असावा.
     हे कदम म्हणजे साप गावचे पूर्वीचे पाटील; आणि पाटील म्हटलं की, त्यांना गावात मान फार आणि जबाबदारीही. त्यामुळे गावाच्या एका बाजूला त्यांचा वाडा आहे. सध्याचे त्यांचे वंशज शिंद्याच्याबरोबर उत्तरेत गेल्यावर तिथेच स्थायिक झाले असले तरी वाड्याच्या निमित्ताने त्याचा गावाशी थोडाफार संपर्क आहे. पूर्वी वाड्यात कोणी रहात नसले तरी गावचा राबता असायचा. सध्या चित्रीकरण वगैरे मुळे वाड्याला चांगले दिवस आल्याने तशी पर्यटकांना प्रवेशबंदी आहे. काही चित्रपट आणि मालिकांचे चित्रीकरणही या वाड्यामध्ये झालेले आहे. 'राऊ', मंगल पांडे हे त्यांपैकीच काही.
  साप गावात येण्यासाठी दोन रस्ते आहेत. एक म्हणजे रहिमतपूरपासून  अंभेरीमार्गे वडुजकडे जाणर्या रस्त्याने  अपशिंग फाट्यावर उजवीकडे वळायचे. आणि दुसरा रहिमतपूरपासून औंधच्या दिशेने एक-दीड कि.मी. पुढे पिंपरी फाट्यापासून डावीकडे. हा रस्तादेखील थोडासा खराब आहे. साप गावामध्ये हा वाडा कदमांचा वाडा म्हणून ओळखला जातो. पुर्वपरवानगी घेउन हा वाडा आतून पहाता येतो.
         सर्वसाधारण ५ एकर पसरलेला हा वाडा तसा बाहेरून एखाद्या गढीसारखा दिसतो. सहा बुरुज तसेच चारही दिशांची तटबंदी अजूनही सलामत आहे. १७ व्या शतकापासून कधी युद्धाचा प्रसंग तसाही आला नसावा त्यामुळेही तसेच थोडाफार वापर राहिल्यामुळे तो अजूनही शाबूत असावा.
   महा-दरवाजावर हत्तीरोधक खिळे अजूनही व्यवस्थित आहेत. अर्थात दरवाजासोबतच त्यांना दिलेल्या रंगामुळे ते अगदी नव्यासारखे दिसतात. पूर्वीच्या काळी युद्धात हत्ती दरवाज्यावर धडका मारू नये त्यासाठी असे खिळे बसवले जात असत.. तिथेच असलेल्या छोट्याशा दिंडी-दरवाजातून  आत गेल्यावर मुख्य दरवाजावर असलेला नगारखाना दिसतो
     इथे मुख्य दरवाजातून आत आल्यावर उजव्या हाताला पाग्याची पडझड झालेली जागा दिसते ('शर्यत' चित्रपटात याच जागी बैल बांधलेले दिसतात.) डाव्या बाजूला एक हौद आहे. याला रंगाचा हौद म्हणून ओळखतात. पूर्वीच्या काळी या हौदाजवळ रंगपंचमीचा सण साजरा केला असल्याचं सांगतात. हा अजूनही चांगल्या अवस्थेत आहे. याच्या समोरच एक लाकडी, मोडकळलेली घोड्याची पागा आहे. वाड्याच्या डाव्या बाजुला मोठी विहिर दिसते. विहिर वापरात असून वाड्याच्या परिसरातली झाडं त्यावरच वाढली आहेत.
वाडा दीड मीटर उंचीच्या जोत्यावर बांधला असून पायऱ्यांनी आत गेल्यावर समोर मोठा चौक आहे. मुख्य इमारतीत प्रवेश केल्यावर प्रथमतः समोर वाड्याची चौसोपी रचना दिसते. इथेच आपण खुश होऊन जातो. वाडा बर्‍यापैकी ऐसपैस आणि चारी बाजून दगडी जोत्यासह प्रशस्त ओसरी असलेला आहे.
इथे चारी बाजूस दगडी चौरंग, बैठका या अजूनही आहेत. ओसर्‍यांच्या कोपर्‍यावर पुरुषभर उंचीचे दोन रांजण आहेत. जोत्याच्या मागे खोल्या बांधलेल्या आहेत. यांतील डावीकडच्या एका खोलीत देवघर आहे. सध्या त्यामध्ये देव नसले तरी त्यांचा चौथरा आणि जवळच एक मोठी समई पाहायला मिळते. याच्या बाजूच्या खोलीपलीकडून दुसऱ्या मजल्यावर जाण्यासाठी पायऱ्या आहेत.
 वरती आल्यावर एक प्रचंड मोठा हॉल आहे. त्याच्या छतावर आणि खांबांमधील महिरपीवर नक्षीकाम केलेले आहे. चित्रीकरणादरम्यान याला पूर्वीचे रूप देण्यासाठी वापरलेल्या रंगामुळे वाड्याच्या इतर भागापेक्षा हा भाग उत्तम राखला आहे. वास्तविक या प्रासादाशिवाय वाड्यामधला कोणताही भाग फार चांगल्या अवस्थेत नाही. या दुसऱ्या मजल्यावरील सर्वच खोल्या मोठ्या आहेत. यांपैकी काही खोल्यांमध्ये वटवाघळांनी वास्तव्य केलेले आहे. हा वाडा साफ-सफाईच्या दृष्टीने प्रचंड मोठा असला तरी त्याची डागडुजी आणि काळजी ही कामे अगदी व्यवस्थित होतात हे देखील लगेच जाणवते.इथे पूर्वी शाळेची होण्यपूर्वी गावातली प्राथमिक शाळा भरायची.
        वाड्याच्या मागच्या दारी तुळशी वृंदावनाच्या चौकात बर्‍यापैकी जीर्णोध्दाराचे काम झालेले आहे.. तिथल्याच इमारतीचा काही भाग मात्र अगदी रहाण्यालायक असा नुतनीकरण केलेला आहे. चित्रीकरणादरम्यान लोकांची राहण्याची/थांबण्याची व्यवस्था इथे होते असं सांगण्यात आलं.  खरं तर वाड्याचा हा भाग अगदी पर्यटकांसाठी रहायला उपलब्ध करुन द्यायला हरकत नसावी असं वाटते. अशा एखाद्या ठिकाणी राहण्याची मजा भारीच असेल.
      वाड्याच्या उजव्या बाजूला मोठी विहीर आहे. बाजूच्या शेताला पाणी देण्यासाठी आजही या विहिरीचा वापर केला जातो. विहिरीमध्ये उतरण्यासाठी पायऱ्याही आहेत. वाड्याच्या भेटीत हि विहीर आवर्जुन पहावी.
वाडा पाहण्यासाठी अर्धा ते पाऊण तास वेळ लागतो. साप गावामध्ये खाण्या-पिण्याची सोय नाही, पण रहिमतपूरमध्ये ती होऊ शकते.
सातारा - साप अंतर २३ कि.मी. आहे.

3 ) धोमचे नृसिंह मंदिर : -

        वाईपासून अवघ्या दहा किलोमीटर अंतरावर धोम हे वृक्षदाटीत वसलेलं अतिसुंदर,निसर्गरम्य गाव.सह्याद्रीच्या रांगेने तीनही बाजूने गराडलेले आणि केंजळगड,पांडवगड उत्तरेचे रखवालदार्,पश्चिमेला धोम जलाशयात जहाजासारखा दिसणारा कमळगड, तर दक्षिणेला पाचगणी, महाबळेश्वरची डोंगररांग. स्वातंत्र्योत्तर काळात ईथे कृष्णा आणि वाळकी नदीच्या प्रवाहावर धरण बांधले गेले आणि धोम गावाचे नाव प्रकाशात आले.मात्र पेशवेकालीन मंदिराचा एतिहासिक ठेवा उराशी कवटाळलेले धोम अभ्यासकांना नेहमीच खुणावत राहीले.पुराणकाळातील ‘धौम्य ऋषीं’चे वास्तव्य त्या भागात होते, म्हणून त्या गावाला ‘धोम’ हे नाव पडले असे सांगतात. त्याच ‘धोम’ गावामध्ये ‘श्री सिद्धेश्वर महादेवा’चे सुंदर शिवालय आहे. गावातून अरुंद डांबरी रस्त्याने मंदिराच्या
तिथल्या मंदिरातही वीरगळ दिसतो.
       दगडी तटबंदीने मंदिराचे आवार बंदिस्त केलेले आहे.दोन्ही बाजुला बुरुज्,नक्षीदार कमान आणि वर नगारखाना असलेले प्रवेशद्वार यातून आपण प्राकारात प्रवेश करतो.याठिकाणी शिवपंचायतन साधले आहे. मंदिर उभारणी पाषाणामध्ये केलेली आहे.
अर्थात ईथे सर्वाधिक लक्षवेधी काय असेल तर तो मंदिरासमोरचा नंदी. नंदी एकाच पाषाणात कोरलेला सुबक आणि रेखीव व देखणा तर आहेच पण ज्या वास्तुरचनेत या नंदीची उभारणी केली आहे ती कल्पकेतीची कमाल म्हणता येईल. शिवमंदीरआणि नृसिंह मंदिर यांच्या मधोमध, एका कमळाच्या आकृतीच्या पुष्करणीची योजना करून त्यामध्ये बरोबर मध्यभागी अडीच मीटर लांबीच्या दगडी कासवाची निर्मिती करून त्याच्या पाठीवर नंदी उभारला आहे.
त्याचे अजून वैशिष्ट्य म्हणजे पुष्करणीमध्ये पाणी सोडले जाते तेव्हा कासव त्याच्या पाठीवर नंदीला घेऊन पाण्यावर तरंगत आहे असा भास होतो. ऊन आणि पाऊस यांपासून संरक्षण होण्यासाठी नंदीच्या डोक्यावर सुंदर नंदीमंडप उभारलेला आहे. तो नंदीमंडपही सुंदर बांधणी केलेला आहे. याचा मागचा विचार असा आहे की कासवी तिच्या पिल्लांना ज्या पद्धतीमध्ये वाढवते त्याप्रमाणे देव त्यांच्या भक्तांना वाढवत असतो!
हिंदु धर्मात निर्माण झालेले पंथ एकत्र रहावेत म्हणून शंकराचार्यांनी एकाच मंदिरात सर्व पंथीयांच्या देवांची मंदिर उभारण्याची संकल्पना आणली,तीच पंचायतन.या मंदिरात शिवपंचायतनामध्ये प्रदक्षिणा मार्गावर सूर्य, गणपती, महालक्ष्मी आणि विष्णू या देवतांची छोटी सुंदर रेखीव मंदिरे उभारली आहेत. या सर्व मंदिरांवर रेखीव नक्षीकाम  केलेले दिसते.
   मुख्य मंदिर शंकराचे असले तरी एका बाजुला एक अनोख्या शैलीचे मंदिर दिसते.हे आहे नरसिंह मंदिर.गोलाकार वास्तु,दोन बाजुला कोनाड्यात असलेल्या मुर्ती आणि वर चढून जायला खडे जीने असा वेगळाच प्रकार ईथे पहायला मिळतो.
यांपैकी पूर्वेकडे जी मूर्ती आहे ती हिरण्यकश्यपू याचा वध करणारी म्हणजे उग्र नरसिंह असून पश्चिमेकडे असलेल्या 'नरसिंह' मूर्तीच्या मांडीवर साक्षात लक्ष्मी बसलेली आहे म्हणजे ;लक्ष्मी नरसिंह. त्या मूर्तीचे वैशिष्ट्य म्हणजे नृसिंहाचे दोन्ही हात हे गुडघ्यावर टेकलेले आहेत. वरील उजव्या हातामध्ये कमळ असून, डाव्या हातामध्ये शंख धारण केलेला आहे. वटारलेले डोळे, गर्जनेसाठी उघडलेले विशाल मुख, त्यातून दिसणारे वरील आणि खालील जबड्यातील आठ दात; तसेच, दातांमधून बाहेर आलेली जीभ अशी ती मूर्ती आणि तिचे भाव जिवंत वाटतात.याचबरोबर ईथे लक्ष्मी नरसिंह यंत्राचा फोटो लावला आहे.
नृसिंह मंदिरामध्ये प्रल्हादाचीदेखील मूर्ती आढळून येते. नृसिंह जयंतीचा उत्सव वैशाख शुद्ध दशमीला मोठ्या प्रमाणात तेथे केला जातो. त्या उत्सवाचा रथदेखील मंदिराजवळ पाहण्यास मिळतो. पूर्वीच्या काळी, त्या देवस्थानामध्ये ठरावीक लोकांना ओलेत्याने जवळून दर्शन घेण्याची मुभा होती आणि बाकीच्या लोकांनी खाली असलेल्या चौथऱ्याच्याजवळ उभे राहून दर्शन घ्यायचे अशी व्यवस्था होती, परंतु आता सर्व मोकळेपणा व सर्वांना मुक्त वावर आहे.
मंदिर परिसरामध्ये उत्तरेकडील प्रवेशद्वाराजवळ गणपतीचे मंदिर आहे. त्याच्या समोर एका संगमरवरी शिलास्तंभावरील पंचमुखी शिवलिंग लक्ष वेधून घेते. चार दिशांना चार मुख- त्यातील एक मुख हे वरच्या बाजूस आहे. त्या मुखांची नावे ही पुराणानुसार तत्पुरुष, वामदेव, अघोर, सद्योजात आणि ईशान अशी आहेत. ती सगळी पंचमुख शंकराची विविध रूपे आहेत.
  धोमचे मंदीर पाहून झाले कि गावाच्या मागील बाजुला असलेल्या धोम धरणाच्या भिंतीच्या परिसरात जावे. धोम धरणाची भिंत एका डोंगररांगेच्या आधाराने उभी केली आहे. त्या टेकाडावर चढून जाताच धोमचं अथांग पाणी, डावीकडे पाचगणी, समोर कमळगड व त्याचे म्हातारीचे दात म्हणून ओळखले जाणारे सुळके, उजवीकडे केंजळगड आदी तालेवार ठिकाणे दिसतात.
 

 धोम :-
         धोमः (वाई ता. १७°५५′' उ; ७३० ४५' पू.) वाईच्या वायव्येस ८ कि. मी. वर कृष्णा नदीच्या उत्तर तीरावर आहे. येथे कृष्णा नदीवर मोठे धरण असून ते धोम धरण या नावाने ओळखले जाते. धोम नदीच्या लगत ३०.४८ मी. x ३६.५८ मी. क्षेत्राच्या आवारात सिद्धेश्वर महादेव, नरसिंह, गणपती, लक्ष्मी आणि विष्णु यांची मंदिरे आहेत. आवारास चहूबाजूने ३.६६ मी. उंचीची विटांची भिंत आहे.
       महादेव मंदिर : यास गाभारा व दीर्घिका असून त्याच्या समोरच्या कमानीचे बांधकाम सारसेनिक पद्धतीचे आहे. या कमानी १.८३ मी. उंच आणि ३० से. मी. जाडीच्या स्तंभावर आहेत. कमानी व आतील भिंती गुळगुळीत व काळ्या दगडाच्या आहेत. गाभारा ४.५२ × ४.२ मी. व दीर्घिका ४.५७ ४०५.४८ मी. ची असून गाभा-यासभोवती ६० सें. मी. ची मोकळी जागा आहे. दीर्घिकेच्या कमानीच्या पुढील भागात भिंतीवर सर्वत्र पानाच्या व शंखासारख्या आकृत्या कोरलेल्या आहेत. तसेच आतील बाजूनेसुद्धा भिंतीवर कोरीव काम आहे. शिखर विटांचे असून मंदिराचे उर्वरित संपूर्ण बांधकाम दगडी आहे. एका उत्फुल्ल कमळावर शिखराची योजना केलेली आहे. गाभा-याच्या व मंडपाच्या प्रत्येक कोप-यावर  लहान लहान शिखरे आहेत. गाभा-यात महादेवाचे लिंग आहे. मंदिरासमोर असलेल्या नंदीमंडपाची वैशिष्ट्यपूर्ण रचना केली आहे. हा नंदीमंडप म्हणजे एक अष्टकोनी हौद आहे. या हौदावर कमानीचे अष्टकोनी घुमटासारखे शिखर आहे. हौदात पाणी असून मध्यभागी दगडी कासवावर नंदी आहे. हे कासव पाण्यावर तरंगत असल्याचा भास होतो. शिखर २.४४ मीटर उंच असून त्यावर नक्षिकाम आहे. मंदिर सुस्थितीत आहे.
     नरसिंह मंदिर : 
      हे वैशिष्ट्यपूर्ण मंदिर असून त्याचा आकार अष्टकोनी आहे. ते १.८३ मीटर उंचीच्या दगडी अधिष्ठानावर आहे. मंदिरात जाण्यासाठी उत्तरेकडून पाय-या आहेत. प्रवेशद्वारावर उंच दगडी कमान आहे. मंदिरात पूर्वेस तोंड असलेली हिरण्यकश्यपाचा वध करतानाची नरसिंह मूर्ती आहे. याच मूर्तीच्या पाठीमागे नरसिंहाची दुसरी मूर्ती असून ती हिरण्यकश्यपाच्या वधानंतर केवळ नृसिंहाची मूर्ती आहे. सन १७६९ च्या डिसेंबरमध्ये थोरल्या माधवराव पेशव्यास बरे वाटावे म्हणून नारायणरावाने या मंदिरात ब्राह्मण अनुष्ठानास बसविले होते.
शिव पंचायतन 
     नरसिंह मंदिराच्या खालच्या बाजूस असलेल्या लहानशा गणपती मंदिरासमोर पंचमुखी शिवलिंग आहे. या मूर्तीची चार तोंडे चार दिशेला असून एक तोंड आकाशाकडे आहे. हे शिवलिंग संगमरवरी दगडाचे आहे.
    याशिवाय या आवारात गणपती, लक्ष्मी व विष्णु, सूर्यनारायण यांची लहान लहान मंदिरे आहेत. गणपती, लक्ष्मी व विष्णू या मंदिरामधील मूर्ती आग-याहून आणलेल्या संगमरवरच्या आहेत. ही सर्व मंदिरे (महादेव मंदिर सोडून) १७८० मध्ये पुण्याच्या महादेव शिवराम या सावकाराने बांधली. मंदिराच्या दरवाज्यापासूनचे पुढील बांधकाम नारायण वैद्य यांनी केले. मंदिराच्या आवाराबाहेर उजव्या बाजूस नदीकाठी दुस-या बाजीराव पेशव्याने श्रीरामाचे लहान मंदिर बांधलेले आहे. याच्या खालच्या बाजूस १७८० मध्ये बांधलेले गणपतीचे देऊळ आहे. नदीच्या वरच्या बाजूस पाऊण कि. मी. वर छत्रपती शाहूने बांधलेले महादेवाचे मंदिर आहे, महादेवाची यात्रा वैशाख पोर्णिमेला (एप्रिल-मे) तर नृसिन्हाची यात्रा वैशाख शुद्ध 14 ला भरते.
 
 
 https://gazetteers.maharashtra.gov.in/

 कराड (आगाशिव) ची बौद्ध लेणी :-

कराड हे तालुक्याचे ठिकाण असून ते सातारा जिल्ह्यात आहे. कराड पासून ४ कि.मी. अंतरावर आगाशिव डोंगरावर प्राचीन बौद्ध लेणी आहे. ती जवळपास ६४ आहेत. प्राचीन बौद्ध लेणी हा कराडचा अनमोल सांस्कृतिक ठेवा आहे. एकेकाळी भारत हा बौद्धमय होता असे अनेक अभ्यासकांचे मत आहे. त्यामुळे कराड परिसर सुद्धा बौद्धमय असावा.
         जगाला शांतता व मानवतेचा संदेश देणाऱ्या गौतम बुद्धाच्या हयातीनंतर इ.स. पूर्व २०० वर्षांपूर्वी हिनयान पंथाच्या बौद्ध भिक्कूंनी ध्यान, तपस्या व धम्म प्रचाराच्या निमित्ताने कराडच्या कृष्णा कोयनेच्या प्रीतिसंगमाच्या सान्निध्यात दक्षिण-पश्चिमेस असलेल्या आगाशीव डोंगराचा परिसर निवडून त्या ठिकाणी डोंगरात १०१ गुंफा कोरल्या आहेत. त्यापैकी ६४ चांगल्या स्थितीत अजूनही आहेत. त्यामध्ये ६ चैत्यगृह (प्रार्थनास्थळ) व इतर विहार स्वरूपात आहेत.
श्रावण महिन्यातील तिसर्या सोमवारी या परिसरातील हजारो लोक आगाशिव डोंगरावरील शंकराच्या मंदिरात येतात. त्यावेळी ते या सर्व लेण्यांचेही दर्शन घेतात. दरवर्षी ह्या लेण्या पाहायला येणार्यांची संख्या वाढते आहे. परंतु काही अपवाद वगळता बहुतांशी लोक या लेण्या पांडवानी कोरल्या आहेत असे मानतात. आता त्यांची हि श्रद्धा असली तरी या बौद्ध लेण्या आहेत हे त्यातील ऐतिहासिक संदर्भ, शिल्पे यावरून दिसून येते. या बौद्ध लेण्या बौद्ध भिक्खुंच्या अभ्यासासाठी व स्वाध्यायासाठी तयार करण्यात आल्या होत्या. परंतु या लेण्या पांडवानी एका रात्रीत कोरल्या आणि त्याही केवळ नखांच्या साह्याने अशा प्रकारचे गैरसमज समाज लोकांच्यात पसरले आहेत. आता संपूर्ण डोंगरात कोरलेल्या या ६४ अवाढव्य लेण्या एका रात्रीत आणि तेही केवळ स्वताच्या नखाने कशा कोरणार हा प्रश्नच आहे. बाकीच्या सर्व गोष्टीकडे दुर्लक्ष केले तर आगाशिव परिसरातील या लेण्या म्हणजे कराडचे सांस्कृतिक वैभव म्हणायला हरकत नाही.          
 पुणे- बेंगळुरू अशियायी महामार्गाच्या पश्चिमेस प्रथम जखिणवाडी. गावात सुरुवातीलाच कमान दिसते. गावच्या दुतर्फा असलेली शोभेची झाडं लक्ष वेधून घेतात. मग उसाच्या शिवारातल्या डांबरीवाटेनं आपण गावाबाहेर पडतो. काही वेळातच डोंगरपायथ्याला येतो.
लेण्यांकडं जाण्यासाठी पायऱ्या आहेत. अलीकडंच त्यांचं बांधकाम झाल्याचं लक्षात येतं. त्यांचा आकारही लक्षात राहतो. सुमारे पावणे चारशे पायऱ्या चढल्यानंतर आपण लेण्यांपर्यंत पोचतो. लेण्यांचं हे जग पाहताना थक्क होतो.
आगाशिवच्या डोंगरातली ही लेणी इसवी सनपूर्व 250 ते 200 या  कालखंडात टप्प्याटप्प्यानं खोदली गेली असल्याचं सांगितलं जातं. या लेण्यांची संख्या जवळपास शंभराच्या घरात आहे. त्यातील 64 लेणी सुस्थितीत आहेत. त्यातही पुरातत्त्व विभागानं पंचवीसेक लेणी विकसित केली आहेत. दरवाजे, जाळ्या, दगडी पायऱ्या, सुशोभन आदी कामं केली आहेत. जवळपास प्रत्येक लेण्याच्या बाहेरील बाजूस  पाण्याचे खोदीव टाकी ज्याला पाण पोढी आणि न्हाण पोढी म्हणतात.
प्राचीन काळात बौद्ध भिक्खूंच्या ध्यानधारणेसाठी आणि पावसाळ्याती; निवास म्हणजे वर्षाकाळातील मुक्काम म्हणून अशा लेण्यांची निर्मिती झाली.लेण्यांमध्ये चैत्यगृहं, विहार, मंदिर, स्तूप यांचा समावेश आहे. काही ठिकाणी एका अखंड, सलग दगडात कोरलेले स्तंभ आहेत.
श्रावणात हा परिसर मनोहारी ठरतो. लेण्यांपासून आणखी चढून वर गेलं, की महादेव मंदिर आहे. शंकरानंद महाराजांचा मठही या परिसरात आहे.
मलकापूरच्या बाजूकडूनही वर येता येतं. कराड नगरीचं विहंगम दृश्य पाहता येतं. मुळात हा सारा परिसर शांत, रमणीय आहे. पुरातत्त्व विभागाकडून त्याची छान डागडुजी करण्यात आली आहे. पर्यटकांसह अनेक अभ्यासक या स्थळास आवर्जून भेट देतात.
       साताऱ्यातून एका दिवसात होणारी ही भटकंती समृद्ध सांस्कृतिक वारशाचे दर्शन घडविते. हे डोंगर लेणे प्राचीन सोैंदर्यकलेचीही साक्ष देते. त्यामुळंच ते आवर्जून पहावे असेच आहे.
 
 
 https://gazetteers.maharashtra.gov.in/cultural.maharashtra.gov.in/english/gazetteer/satara_mar/preface.html
 
 कराड लेणी: 
     कराड हे प्राचीन काळी भरभराटीस आलेले नगर होते हे इतिहासप्रसिध्द आहे. त्याकाळी करहाकट असा याचा उल्लेख मध्य प्रदेशातील भारहृत येथील शुंगकालीन (इ. पू. २ रे शतक) अभिलेखात आलेला आहे. पुढे याचंच रूपांतर करहाटक असे झाले. सध्याचे कराड याच प्राचीन करहाटक नगरीच्या अवशेषावर कृष्ण-कोयनेच्या संगमावर उभे आहे.
येथे प्राचीन काळी डोंगरात कोरलेली ६५ पेक्षा अधिक लेणी आहेत. त्याची स्थलसापेक्ष तीन गटात विभागणी केली जाते. इ. स. १८४९ मध्ये सर बार्टल फ्रेअर यांनी या लेण्यांची पहिली नोंद करून पुढीलप्रमाणे तीन गटात केलेली विभागणी स्वीकारार्ह मानली गेली आहे.
(१) जखिणवाडीची लेणी : ही एकूण २३ लेणी येथील डोंगराच्या दक्षिणेकडील बाजूला असून कराडपासून सुमारे ६ कि. मी. अंतरावर पश्चिमेस आहे.
(२) अगाशिवची लेणी: डोंगराच्या एका कड्याच्या उत्तरेकडील बाजूला कोयनेच्या दरीकडे तोंड करून आहेत, ती १९ लेणी.
(३) या गटातील लेणी आजूबाजूस विखुरलेली असून कोयना खो-याकडे तोंड करून आहेत. ती एकूण २२ आहेत.
याशिवाय नव्यानेच उघडकीस आलेली चचेगावच्या परिसरातील ४ लेणी, खोदलेली अनेक कपारीवजा (Cavern) लेणी आणि पिण्याच्या पाण्याची खोदलेली टाकी आहेत. थोडक्यात म्हणजे ही सर्व लेणी कराडच्या दक्षिण व पश्चिम परिसरात कराडपासून ४ ते ७ कि. मी. अंतरावर डोंगरात पसरलेली आहेत. कराड हेच महत्त्वाचे नगर त्या परिसरात असल्यामुळे त्यांना कराडच्या लेणी असंच संबोधिले जाते. उपरोल्लेखित सर बार्टल फ्रेअर यांच्यानंतर या लेण्यांवर पहिल्यांदाच सविस्तर लिहिले आहे सर जेम्स फर्ग्यूसन व सर जेम्स बर्जेस या लॉवकांनी या लेण्यावर पहिल्यादाच सविस्तर लिहिल आहे सर जम्स फग्युसन व सर जम्स बजस या लेखकांनी.
     या लेणी समुहातील सर्व लेणी बौध्दधर्मीय असून ती थेरवादी (हीनयान) पंथी यांची आहेत. यातील सहा चैत्यगृहे असून बाकीचे विहार आहेत. चैत्यगृह म्हणजे प्रार्थनागृह. त्यात पूजार्ह असते ते स्तूप व विहार म्हणजे वसतिगृह. वर्षावासात (पावसाळ्यात) भिक्षुना एका ठिकाणी राहून अध्ययन करता यावे म्हणून अशा निवांत जागेच्या निवासस्थानांची आवश्यकता असते.
       येथील कोणत्याही लेण्यात शिल्पे नाहीत, कलाकुसर नाही अथवा नक्षीकामही नाही. सारी लेणी अनलंकृत आहेत. त्यामुळे ही लेणी कलाप्रेमी मंडळीकडून उपेक्षित राहिली असली तरी प्राचीन शैलस्थापत्याच्या अभ्यासकांचे दृष्टीने महत्त्वाच्या ठरतात. बौध्दलेणी खोदण्याचे कालक्रमदृष्ट्या दोन टप्पे मानले जातात. पहिल्या टप्यातील हीनयान लेणींची सुरूवात इसवी सन पूर्व दुस-या शतकात झाली आणि या टप्प्याचे काम संपले ते इसवी सनाच्या दुस-या शतकात. दुस-या टप्प्यातील महायान लेणींचा प्रारंभ इसवीच्या पाचव्या शतकात झाला असे मानले जाते. या अनुषंगाने अभ्यासकांपुढील प्रश्न असा की, या दोन टप्प्यांच्या मधल्या काळातील परिस्थिती या संदर्भात काय होती, कशी होती हा आहे आणि कराड येथील लेणींचे महत्त्व येथे लक्षात येते.
      बरीचशी लहान आकाराची लेणी, स्तंभविरहित चेत्यगृहे व मंडप, सपाट छत, खोदलेल्या खोल्यातील कोरलेले मंचक, स्तूपांचे प्राथमिक स्वरूपाचे आकार, चोकोनी स्तंभयुक्त ओव-या आणि शिल्पविरहितता व अनलंकृतता या सगळ्यांचा संकेत या लेणी ख्रिस्ताब्दाच्या पहिल्या काही शतकातील असावीत असा होतो.
     कराडच्या लेणीचे महत्त्व येथे लक्षात येते, कारण ही लेणी दोन टप्याच्या मधल्या संक्रमणवस्था काळात मोडतात. या लेणींची समकालीन लेणी पश्चिम महाराष्ट्रात कुडे, जुन्नर, कान्हेरी, महाड इत्यादी ठिकाणीही आहेत. कराड येथील बहुतेक सर्व लेणी निकृष्ट दर्जाच्या अग्निजन्य खडकात कोरलेली असल्यामुळे व मानवी दुर्लक्षामुळे दयनीय अवस्थेत कशीबशी तग धरून उभी आहेत. ठिसूळ नि ओबडधोबड अशा खडकात ती कोरलेली असल्यामुळे त्यावर उत्कीर्ण लेख आढळत नाहीत. याला अपवाद म्हणजे क्र. ४७ च्या लेणीतील एक लेख. या लेखातील अक्षरवाटिकेवरून तो कार्ले येथील उत्कीर्ण लेखाच्या समाकालीन असावा असे तज्ञ मानतात. या लेणी पुणे जिल्ह्यातील शेलारवाडी आणि रायगड जिल्ह्यातील कुडे व पाले येथील लेणींच्या काळातील आहेत. त्या जुन्नर किंवा नाशिक येथील लेणींपेक्षा फार नंतरच्याही नाहीत हे नक्की.
ब-याच वेळा लेण्यांचा आकार व ठेवण ज्या डोंगरात ती खोदलेली असतात त्या डोंगराच्या रचनेवर अवलंबून असते, उभ्या सरळसोट डोंगरात ती खोदायची तर समोरील बाजूस प्रांगणाची योजना करता येत नाही. ह्या कारणामुळेच अजिंठे, पितळखोरे, कोण्डाणे, बेडसे इत्यादी ठिकाणच्या लेणींसमोर प्रांगण सहसा आढळत नाही. या उलट जर उतरत्या डोंगराच्या दर्शनी भागावर लेणी खोदायची असेल तर प्रांगणाची योजना करावीच लागते, म्हणजे मग हव्या त्या उंचीचा डोंगर प्रांगणाच्या मागील बाजूस उपलब्ध होऊ शकतो. कराडची लेणी या गटात मोडतात. कुडा व कान्हेरी येथील लेणीही अशीच आहेत.
येथील लेणींपैकी बरीचशी लेणी आकाराने लहान, अनलंकृत नगण्य असल्यामुळे अनाकर्षकही आहेत. त्यांच्या सविस्तर वर्णनांचे त्यामुळेच प्रयोजन उरत नाही. जी थोडी ठळक, सुस्थितीत व म्हणून लक्षवेधक आहेत त्यांचीच वर्णने प्रस्तुत करणे उचित ठरेल.

पहिला गट

लेणे क्रमांक १: या गटातील पश्चिमेकडील अगदी टोकाला असलेला हा एक
छोटेखानी विहार होय. त्याचे दर्शनी बाजूस ओवरी असून तिला दोन चौकोनी, अनलंकृत स्तंभ व दोन भित्तिस्तंभ आहेत. अर्वाचीन काळात तेथे कोणा एका साधूने काही बांधकाम केले होते. ओवरी ओलांडून पुढे गेल्यावर सभामंडप (६.५४३.२८ मी. लांबरुंद व २.११ मी. उंच) लागतो. त्याच्या मागील भिंतीत एक ओटा कोरलेला आहे. त्याही मागे दोन खोल्या खोदलेल्या असून त्यातून मंचकर्ती खोदलेले आहेत.
लेणे क्रमांक २ : क्रमांक १ च्या लेण्यासारखेच म्हणजे ओवरीयुक्त सभामंडप असलेले आहे. सभामंडप मात्र समभुज चौकोनी आहे (९.६१४९.६१ मी.). ओवरीला दोन स्तंभ असून ते नक्षीविरहित व चौकोनी आहेत.
लेणे क्रमांक ५ : हे थोड्या वेगळ्या धाटणीचे व अनोख्या प्रकारचे आहे. हीनयानांच्या उत्तरकालीन लेणीमध्ये आढळणा-या उत्क्रांतिदर्शक घटकांचा प्रारंभ येथे आढळतो. हे एक चैत्यगृह आहे. भारतीय पुरातत्व सर्वेक्षणाने याला नव्याने ६ वा क्रमांक दिलेला आहे. याचे प्रारंभी लांबट प्रांगण (५.१४ मी. x ४.१० मी.) असून त्यात डावीकडे एक खोली व ओटा आहे. तर उजवीकडे दोन लहान खोल्या आहेत. या प्रांगणातून चैत्यगृहात जाण्यास एक अरूंद मार्ग कोरलेला आहे. खोल्यायुक्त प्रांगण नि चैत्यगृह अशा प्रकारची ही रचना पाहता या लेण्याला चैत्यगृहवजा विहार म्हणता येईल.
हे चैत्यगृह जुन्नर येथी चैत्यगृहाप्रमाणेच असले तरी अधिक साधे आहे. हे नैऋत्याभिमुख आहे. चापाकृतीच्या म्हणजे एका टोकास अर्धवर्तुळाकृती ठेवणीचे नि गजपृष्ठाकृती छताचे हे असून त्यात स्तंभावली नाही. त्यामुळे चैत्यगृहाची विभागणी नेहमीप्रमाणे मध्यविथि (nave) व दोन्हीकडे कक्षे (aisles) अशी करता येत नाही. हे ४ मी. रुंद व ९.७५ मी. लांब (खोल) आहे. याला जे छत कोरलेले आहे ते भाजे, पितळखोरे येथील चैत्यगृहाला आहे तसे ख-या अर्थाने गजपृष्ठाकृती नाही. दिसण्यास तसेच असले तरी हे आहे मात्र फार उथळ. याचे मागील भिंतीत व दोन्ही बाजूच्या भिंतीवर व त्यांचे वरच्या छताला असलेल्या खोबण्यांवरून तेथे लाकडी तुळया बसवल्या होत्या असे दिसते. अशीच रचना भाजे, कार्ले इत्यादि ठिकाणीही आढळते.
आत चापाकृती भागाची दोनतृतीयांश जागा व्यापणारा स्तूप आहे. स्तूपाभोवती प्रदक्षिणा पथ आहे. अधिष्ठानावर अर्धाण्ड, हर्मिका, छत्रदंड आणि छत्र अशी स्तूपाची रचना आहे. हर्मिकेवर वेदिकेची नक्षी आहे. छत्रदंड आता तुटक्या अवस्थेत आहे. छत्र तर छतातच कोरलेले आहे किंबहुना छत्र असे कोरले गेले याचाच अर्थ छताची ठेवण खरीखुरी गजपृष्ठाकृती नाही. तसे असते तर त्या खोलगट वितानावर असे छत्र खोदता आलेच नसते. येथे आहे असेच छत्र कुडे व पाले-महाड येथील चैत्यगृहातही आढळते. विशेष म्हणजे या चैत्यगृहाचे प्रवेशद्वारावर नेहमीप्रमाणे उजेडासाठी असलेले गवाक्ष चेत्याकृती नसून ते चौकोनी (१.२० मी.) आहे. असाच बदल पितळखोरे (क्र. १०) व जुन्नर (भूत लेणे) येथेही चैत्यगृहात आढळतो. तेथेही चेत्यगवाक्ष नसून त्यात बदल झालेला आढळतो. येथल्या प्रवेशद्वाराचे आणखी एक आकर्षण म्हणजे त्याचे दोन्ही अंगास एकेक भित्तिस्तंभ आहे. त्या स्तंभाचे खालील भाग नष्ट झाले आहेत. तरीसुद्धा ते स्तंभ अष्टकोनी असल्याचे अवशेषांवरून कळते. डावीकडील स्तंभदंडाचे वरच्या बाजूस घंटाकृती व त्यावर उलटे पिरॅमिडाची रचना आहे व वरच्या टोकास धर्मचक्र आहे तर उजवीकडच्या स्तंभशीर्षाची ठेवण अशीच असली तरी वरच्या टोकास सिंहाकृती (शार्दुल) आहे. ज्या दोन स्तंभशीर्षावर ही दोन चिन्हे म्हणजे धर्मचक्र व सिंह आहेत ती स्तंभशीर्ष नाशिक लेणीतील (क्र. ३) स्तंभशीर्षाप्रमाणे आहेत. बौद्धमर्षीयांमध्ये धर्मचक्राला व शाक्यमुनीच्या (बुद्धाच्या) कुलचिन्हाला म्हणजे सिंहाला महत्त्वाचे स्थान आहे. एवढेच नव्हे तर बुद्धाला शाक्यसिंह म्हणूनही संबोधिले जाते. चैत्यगृहातील स्तूप विचारात घेता ही तीन महत्त्वाची प्रतीके येथे असल्याचे दिसते. बुद्ध (सिंह हे प्रतीक), धम्म (धर्मचक्र हे प्रतीक) व तथागतांचे महापरिनिर्वाण (स्तूप हे प्रतीक) अशा प्रकारची महत्त्वपूर्ण रचना हीनयान लेणीत अन्य क्वचितच आढळते.
स्तंभविरहित तरीही चापाकृती चेत्यगृहाचा हा उत्तम नमुना आहे. आधीच्या हीनयानी चैत्यगृहांपेक्षा यातील स्थपत्य रचनेत काही बदल झालेले आढळतात. म्हणूनही या लेणीचे स्थापत्यशात्राच्या अभ्यासकाला महत्त्व वाटते. नेहमीचा ठराविक चापाकृती आकार येथे असला तरी चैत्यगृह स्तंभविरहित आहे. वितान (छत) ख-या अर्थाने गजपृष्ठाकृती नसून ते कमानीच्या ठेवणीचे व उथळ आहे. तसे ते असूनही वितानाला लाकडी तुळया जोडण्याची पद्धती येथेही अनुसरली आहे. याशिवाय प्रवेशद्वारावरील चौकोनी गवाक्ष हेही उत्तरकालीन शैलगृह स्थापत्याचेच लक्षण आहे.
लेणे क्रमांक ६ (नवा क्रमांक ७) प्रांगणयुक्त विहारवजा चैत्यगृहाचे हे एक उदाहरण
आहे. समोर ओवरी असलेला सभामंडप असे याचे मूळ स्वरूप होते. ओवरीच्या दर्शनी बाजूस दोन अष्टकोनी अनलंकृत स्तंभ असून दोन्ही टोकास एकेक अर्धस्तंभआहे. या सर्वांची शीर्षे घंटाकृती असून त्यावर नाशिक, कुडे वा पाले येथील लेण्यात आढळतात तसे पाय-या पाय-यांचे (उलट्या पिरॅमिडसारखे) मथळे (अॅबकस) आहेत. येथील सभामंडपाचे (५.०५ मी. रुंद व ५.५५ मी. लांब) दोहो अंगास लांबट आकाराच्या खोल्या आहेत. डावीकडच्या खोलीच्या मागील भिंतीलगत एक ओटा कोरलेला आहे तर उजवीकडील खोलीला तिच्या डाव्या बाजूस एक लहान खोली आहे. मंडपाच्या मागील भिंतीलगतचा ओटा खोदून काढून आत एक चैत्यगृह (३.३६ मी. रुंद व ५.५० मी लांब) कोरलेले आहे. हे समभुजचौकोनी आकाराचे व सपाट छताचे आहे. ह्यातील स्तूप अडीच मीटर परिघाचा आहे. त्याचे दर्शनी बाजूस अर्वाचीन काळात कोरलेली श्री विठ्ठल मूर्ती आहे.
लेणे क्रमांक ११ (नवा क्रमांक १२) हे चैत्यगृहच आहे.
मी.) असून त्याचे पुढे तेवढ्याच आकाराचे प्रांगण आहे. नाही. ते आहे समतल वितान. आतील स्तूपाची मोठ्या प्रमाणत पडझड झालेली आहे. गावक-यांनी डागडुजी करून ते पूजार्ह केलेले आहे. हर्मिका, छत्रदंड असून छताचे पृष्ठभागी कोरलेले छत्र आहे. हे आयताकृती (८.७८ X ४.२७या चैत्यगृहाचे छत गजपृष्ठाकृती स्तूपाच्या अर्धाण्ड भागावर ते परिधाने विस्तृत आहे. लेणे क्रमांक १६ (नवा क्रमांक १७) हे लेणे प्रांगण, ओवरी, मंडप व चैत्यगृह यांनी युक्त आहे. प्रांगण चांगलेच विस्तृत असून रुंदी मात्र ओवरी व मंडपाच्या रुंदीएवढीच आहे. ओवरीला दोन साधे अनलंकृत चोकोनी स्तंभ असून त्यांना स्तंभपाद (तळखडे) नाहीत की स्तंभशीर्षही नाहीत. या स्तंभाशिवाय कडेला दोन भित्तिस्तंभ आहेत. ओवरीतून लांबट आकाराच्या मंडपात प्रवेश करता येतो. या प्रवेशद्वाराच्या दोन्ही अंगास चौकोनी आकाराची खिडकी आहे. मंडप (६.२० X ३.४१ मी.) आकारचा आहे. त्याला कुडे येथील लेणीत आहे तसा ओटा नाही. आतील चैत्यगृह समभुजचौकोनी (४.५० X ४.५० मी.) आहे. त्याला समतल वितान म्हणजे सपाट छत आहे. वर्तुळाकृती अधिष्ठानावर अर्धा पडभाग असून त्यावर साधी हमिका व छत्रदंड आहे. यावरील छत्र वितानातच कोरलेले आहे. त्यामुळे त्याला आधार म्हणून कोरलेले बलदंड छत्रदंड प्रतीकात्मकच ठरते. मंडपाच्या भूमीपेक्षा चैत्यगृह थोड्या अधिक उंचीवर आहे. अशीच रचना कुडे येथेही आढळते. त्यामुळे दोहोंची रचना एकाच काळातील असावी असे वाटते.
या पहिल्या गटातील लेण्यांपैकी क्रमांक ४, ९ व २० च्या लेणी म्हणजे विहार होत. ते आकाराने याच गटातील अन्य विहारांपेक्षा विस्ताराने अधिक मोठे आहेत. या विहारांमध्ये तिन्हीकडील भिंतीत खोल्या असून त्यातून मंचक कोरलेले आढळतात. बौद्ध भिक्षुची ही निवासस्थाने होत.
दुसरा गट : या गटात १८ लेणी असून कोयनेच्या खो-याच्या तोंडाशी जना प्रारंभहोतो.
लेणे क्रमांक २४ : समुहातील हे पहिले लेणे आहे. ओवरी व मंडप यांनी युक्त असा हा विहार आहे. या ओवरीला मूळात दोन चौकोनी अनलंकृत स्तंभांचा आधार होता. तिच्या दक्षिणेकडील टोकास छताच्या जवळच चार चैत्याकृती कमानींची ओळ असून त्यांचे वरच्या व खालच्या बाजूस वेदिकानक्षी आहे, आणि कमानींच्या (चैत्याकृतींच्या) मधल्या जागी अल्प  उठावातील पुष्पस्थली (टोरस) कोरलेली आहे. भित्तिस्तंभ आहेत. किंबहुना त्याच्यामुळे ही भिंत भागात कोरलेल्या प्रतिमा आता दिसत नाहीत. मंडपाच्या दुस-या म्हणजे उत्तरेकडच्या भिंतीवर नालेच्या आकाराच्या तीन कमानी कोरल्या असून त्यांच्यातील आकाराने थोड्या मोठ्या असलेल्या मधल्या कमानीत स्तूपाचे उठावशिल्प आहे. अशीच एक रचना कोण्डाणे येथील लेणीतही आढळते.
येथील मंडपातील उजवीकडील भिंतीत चार खोल्या, मागच्या भिंतीत तीन खोल्या आणि डावीकडील भिंतीत एक खोली खोदलेली असून उजेडासाठी प्रत्येक खोलीला वातायन पुरवलेले आहे. ते ३८ x ३८ सें. मी. चौरसाकृती असून छताला भिडलेले आहे. असे वातायन फक्त मागील भिंतीतील मधल्या खोलीला नाही.

यानंतर थोडेफार प्रेक्षणीय आहे ते क्र. २९ चे लेणे. वस्तुतः हे सध्या ज्या अवस्थेत दिसते मूळात त्या अवस्थेत नव्हते. मधली भिंत पडल्यामुळे दोन लेणींचे मिळून एकच लेणे दिसते अशी त्याची सध्याची स्थिती आहे. यातील चारही खोल्यांना वातायने आहेत.
क्रमांक तीसचे लेणे म्हणजेही एक विहारच आहे. त्यातील मंडपाच्या भिंतीत एकूण अकरा खोल्या आहेत. यापैकी एका खोलीत एक लहान खोली असल्यामुळे ती १२ वी खोली म्हणता येईल. या विहाराची बरीच पडझड झाली आहे.
येथून सुमारे १ कि. मी. वर आणखी एक लेणी समूह आहे. त्यात क्र. ३१ पासून ३५ पर्यंतच्या लेणी आहेत. ह्या लेणी म्हणजे विहारच होत. लहान व साधे असे या लेणींचे स्वरूप असल्यामुळे त्यांचे वर्णन करण्यासारखे वा प्रेक्षणीय असे काही नाही. मात्र येथून पश्चिमेकडे ९० मीटर अंतरावर असलेल्या क्र. ३६ च्या विहारलेण्यात एकात एक दोन मंडप आहेत. पैकी बाहेरचा मंडप ५.११ मी. x ३.९२ मी. आकाराचा आहे. त्याचे उजवीकडील व डावीकडील टोकास एकेक खोली आहे. या मंडपातूनच दुसरा २.८२ मी. x ३.७९ मी. x रमी, मंडप आहे. त्याला सहा खोल्या आहेत आणि दोन मंचक कोरलेले आहेत.
या दुस-या गटात एकही चैत्यगृह नाही. म्हणजेच येथील विहारात राहणारे सर्व भिक्षाण
आधीच्या गटातील लेणीसमुयच्या चैत्यगृहांचाच प्रार्थनेसाठी उपयोग करीत असावेत हे स्पष्ट आहे. कदाचित या त्रुटीमुळेच क्रमांक २४ च्या विहारात एके ठिकाणी उठावशिल्पातील स्तूप कोरलेला असावा.
तिसरा गट यातील लेणी दोन भागात विभागता येतील. पहिल्या भागातील लेणी
उत्तराभिमुख असून दुस-या भागातील लेणी यांच्या पश्चिमेकडे व पश्चिमाभिमुख आहेत. या दोन्हीत मिळून क्र. ४२ ते ६३ च्या लेणींचा अंतर्भात होतो. यातील पहिल्या पाच लेणीत प्रेक्षणीय वा अभ्यासनीय असे काहीही नाही. लेणे क्र. ४७ ते ४८ या वेगवेगळ्या कारणांनी महत्त्वाच्या ठरतात. लेणे क्र. ४७ मध्ये एकात एक अशा दोन खोल्या असून त्यांची बरीच पडझड झालेली आहे. या पडझडीचे मुख्य कारण म्हणजे येथील दगडाचा ठिसूळपणा. या दोहोंपैकी समोरच्या खोलीत डावीकडील भिंतीच्या वरच्या कोप-यात कराड लेणीतील आतापर्यंत ज्ञात झालेला एकुलता एक उत्कीर्ण लेख आहे." "गोपाळपुतस संघमित्रस लेणं देवधम". म्हणजे गोपळाच्या संघमित्र नामक मुलाने हे पुण्यप्रद दान दिले आहे. यावरून अनुमान करता येईल की, या लेण्याप्रमाणे कराड येथील आणखी काही लेणी कुणाकुणाच्या दानामुळे निर्माण झाली असावीत. त्यासंबंधीचे लेख कोरले गेले असतीलच तर ते एव्हाना निसर्गहत (नष्ट) झाले असावंत..
चैत्यगृह (लेणे क्र. ४८) : वर उल्लेखिलेल्या कोणत्याही चैत्यगृहापेक्षा (क्र. ६, ७, १२, १७)
वेगळ्याच घाटणीचे हे चैत्यगृह आहे. ओवरीच्या आतल्या अंगास आजूबाजूला दोन दोन खोल्या घेऊन मध्यात हे उभे आहे. ओवरीला ४ चौकोनी स्तंभ असून ओवरीच्या दोन्ही टोकास एकेक भित्तिस्तंभ आहे. हे सार कराड लेणीच्या परंपरेनुसार अलंकृत आहेत. मधले चैत्यगृह ८.२४ मी. लांब, ३.४३ मी. रुंद व ३.२३ मी. उंच असून ते आयताकृती आहे, चापाकृती नाही. स्तूपाचा अधिष्ठानाच्या वरच्या कडेला व हर्मिकेवर वेदिकेची नक्षी आहे. हर्मिकेपासून वर आलेल्या छत्रदंडावरचे छत्र छतातच कोरलेले आहे.
चा चैत्यगृहाचे एक वैशिष्ट्य आहे. स्तूपासमोरच्या बाजूस उजवीकडच्या भिंतीवर एक मनात भरेल अशी शिल्पाकृती आहे. कराड़ें येथे इतक्या मोठ्या संख्येने असलेल्या लेणीत एकही शिल्प आढळत नसताना हे येथील शिल्प सहाजीकच उठून दिसते. या शिल्पपटात तीन व्यक्ती आहेत. त्या थोड्या निसर्गहत (झिजलेल्या) झालेल्या आहेत, त्यामुळे स्पष्टता कमी आहे. यातील डावीकडील पुरुष आकाराने सर्वात मोठा आहे, त्याच्या डोक्यावर समोर मोठी गाठ असलेला फेटा आहे. असे फेटे सातवाहन काळातील अन्य ठिकाणच्या शिल्पांतील तसेच भितीचित्रातील पुरुषांच्या डोक्यावर आढळतात. उदाहरणार्थ पितळखोरे, अजिंठे, कार्ले, बेडसे इत्यादी ठिकाणच्या शिल्पांत व चित्रांत असे फेटे आढळतात. या व्यक्तीने कटिअंबर अशा पद्धतीने नेसलेले आहे की, त्याच्या सोग्याच्या नि-या दोन्ही मांड्यात घोळतात. त्याने दोन्ही हातात ज्या वस्तू घेतलेल्या आहेत त्यांची ओळख न पटण्याइतक्या त्या झिजल्या आहेत. त्याच्या डावीकडील स्त्री प्रतिमेच्या हातात एक मंजुषा आहे आणि ती त्या पुरुषाला आलिंगन देण्याच्या पवित्र्यात उभी आहे. या दोहोंच्या वरच्या बाजूस आणखी एक शिल्प आहे, त्याची ओळख मात्र पटत नाही.
      अगाशिवच्या पुढेच चचेगाव आहे. आणि अगाशिवच्या डोंगरातील लेणींच्या रांगेतीलच
डोंगराच्या एका कड्यावर नव्याने काही लेणी उघडकीला आल्या आहेत. भारतीय पुरातत्त्व खात्याने मातीने बुजलेल्या या लेणी स्वच्छ केल्यामुळे त्या आता दृश्य झाल्या आहेत. 
 या एकूण चार लेणी आहेत.
 त्यात एक चैत्यगृह व तीन विहार आहेत. या आकाराने चांगल्याच मोठ्या आहेत, पण यातील काही अर्थवट व अपु-या आहेत. काहीची पडझडही झालेली आहे.
चचेगाव समूहातील पहिले लेणे ६.४५ मी. रुंद, ७ मी. लांबीचे व ३ मी. उंचीचे आहे. त्याच्या संपूर्ण रुंदीएवढे प्रवेशमार्ग आहे असेच म्हणायचे कारण याला स्वतंत्र असे प्रवेशद्वार नाहीच. याला विहार म्हणता येईल कारण याच्या मागच्या भिंतीत दोन खोल्या कोरलेल्या आहेत. मात्र त्यासाठी काही योजना केलेली नव्हती असे दिसते. भिंतीत कुठेतरी एका बाजूला त्या कोरलेल्या आहेत. त्याही अर्धवटच आहेत. उजवीकडच्या व डावीकडच्या भिंतीत खोल्या नाहीत. तेव्हा एका मंडपाला विहाराचे रूप देण्याचा हा प्रयत्न असावा.
५३ एस. नागराजू बुद्धिस्ट आर्किटेक्चर ऑफ वेस्टर्न महाराष्ट्र, १९८१, पृ. १३६.
चचेगाव समुहातील लेणे क्रमांक २ हेही एक विहार लेणे आहे. हा चांगला ऐसपैस विहार आहे. यांच्यासमोर ओवरी आहे आणि आत एक मंडप असून तो ८.९६ मी. रुंद व १२.३ मी. लांब आहे. याची विभागणी दोन भागात करावी लागेल. कारण प्रवेशद्वारातून आत जाताच जो भाग लागतो तो अधिक उंचीचा आहे, तर मंडपाचा आतील भाग थोड्या कमी उंचीचा आहे. पहिल्याची उंची २.३० मी. असून दुस-याची २.०३ मी. आहे. जो भाग दारापुढील आहे तो ३.४० मी. लांबीचा आहे.
      मंडपाचे तिन्ही भिंतीत भिक्षूना राहण्यासाठी खोल्या खोदलेल्या आहेत. यांची रचना विशेष प्रकारची असल्यामुळे त्याचे वर्णन देणे आवश्यक आहे. मंडपाच्या प्रारंभीचा जो भाग आहे त्याच्या डावी उजवीकडे एकेक खोली आहे आणि उरलेल्या भागासही क्रमाने ४ व ५ खोल्या आहेत. डावीकडच्या भितीतील ५ वी खोली विशेष रचनेची आहे. इतर खोल्यांच्या रांगेत त्यांच्या आकाराचे एक दालन असून त्यातून आत गेले म्हणजे ही पाचवी खोलो लागते. कदाचित एखाद्या विशेष अधिकाराच्या भिक्षूसाठी ही असेल. पण याहीपेक्षा अधिक महत्त्वाची वाटते ती मागच्या भिंतीतील उजवीकडच्या खोल्यांची रचना. या भिंतीत डावीकडून आधी चार खोल्या आहेत आणि त्याच रांगेत येते ती कोप-यातील खोल्यांसमोरील ओवरी. ही २.६५ मी. लांबीची व २.०३ मी. उंचीची आहे. या ओवरीची रुंदी आहे १.४२ मी. ओवरी ओलांडल्यावर खोदलेल्या दोन खोल्या लागतात. यातील अगदी उजव्या कोप-यातील खोली २.३० मी. रुंद व २.४५ मी. लांब आहे. तिचा प्रवेशमार्ग २.०३ मी. उंचींचा व ०.९६ मी. रुंदीचा आहे. या प्रवेशमार्गाजवळच भिंतीत उजेड व हवेसाठी एक लंबवर्तुळाकृती वातायन आहे. तसेच ते मंडपातील हालचालीकडे लक्ष देता यावे म्हणूनही उपयोगी पडत असावे. दुसरी खोली पहिल्या खोलीपेक्षा लहान असून तिला वातायन नाही. दोन्ही खोल्यांना मिळून एकच ओवरी आहे.
चैत्यगृह : या गटातील हे एकुलते एक चैत्यगृह होय. तीन विहारात मिळून हे एक चैत्यगृह आहे. दर्शनी बाजूस ३.२५ मी. उंचीची व ३.९२ मी. रुंदीची चेत्यकमान असून आतील बाजूस ३.१५ मी. उंचीचे व १.३५ मी. रुंदीचे प्रवेशद्वार आहे. चैत्यगृह आकाराने क्र. ४८ च्या चैत्यगृहाप्रमाणेच आहे. मात्र यात कोणतेही शिल्प नाही. चापाकृती भागाचे मध्यात तीन लहान लहान होत जाणा-या वर्तुळांचे अधिष्ठान आहे. त्यावरील अर्धाण्ड, हर्मिका, छत्रदंड व छत्र नाहीसे झाले असावे. चेत्यगृहात स्तंभ नसल्यामुळे त्याची विभागणी मध्यवीथि व कक्ष अशी करता येत नाही. येथील छत गजपृष्ठाकृती आहे.
बाहेरील चैत्याकृती कमानीचे डावीकडे काही खोल्या दिसतात, पण त्यांच्यात माती भरली गेल्यामुळे त्यांचे स्वरूप लक्षात येऊ शकत नाही. तर उजवीकडच्या बाजूस थोड्याशा उंचीवर अपूर्ण राहिलेले खोदकाम दिसते.
     या सम्फुयतील लेणे क्र. ४ हे सुद्धा विहारच आहे. द्विस्तंभाधारित ओवरी व मंडप असे याचे स्वरूप आहे. ओवरीची लांबी ८.२० मी., रुदी ३.७१ मी. व उंची २.२७ मी. आहे. तिचे चौकोनी स्तंभ ४६ सें. मी. रुंदीचे आहेत. त्यातील उजवीकडचा स्तंभ तुटला आहे. ओवरीच्या दोन्ही कोप-यात भित्तिस्तंभ आहेत. उजवीकडे पाण्याचे टाके आहे.
        मंडपाचे प्रवेशद्वार १.८७ मी. उंचीचे व १.२२ मी. रुंदीचे आहे. दारावरील कपोताला धनुष्यासारखा आकार दिला आहे. ही फार वैशिष्ट्यपूर्ण रचना आहे. या धनुष्याची निमुळती होत जाणारी टोके दाराच्या दोन्ही बाजूस जमिनीवर टेकलेली आहेत. आणि त्याचे प्रयोजन आहे डोंगरातून झिरपणारे पाणी वाहून नेणे. अशी उपयोगी पडणारी व कलात्मक रचना अन्यत्र क्वचितच आढळते.
मंडपाचे आतील बाजूस तिन्हीकडील भिंतीत खोल्या खोदलेल्या आहेत. मागील भिंतीत चार व उजवी डावीकडील भिंतीत तीन-तीन खोल्या आहेत. त्यापैकी डावीकडील खोल्यांमधील मागील भिंतीस लागून असलेल्या खोलीला १.८८ मी. उंचीचे व ८० सें. मी. रुंदीचे दार आहे.
 
 

 परळीचे शिवमंदिरे

सातारा शहराच्या नैऋत्येस ९ किमी. सज्जनगड च्या पायथ्याशी ' परळी ' हे प्राचीन गाव आहे. या गावाच्या बाहेर काही अंतरावर हेमाडपंथी बांधणीची दोन प्राचीन शिवमंदिरे आहेत अभ्यासकांच्या मते त्याची बांधणी यादव काळात १३ व्या शतकात झाली असावी .
शेजाशेजारी असणाऱ्या या दोन शिवमंदिरांपैकी दक्षिणेस असणाऱ्या मंदिराची पूर्णपणे पडझड झालेली आहे. त्यातील फक्त गर्भगृहाचा भाग शिल्लक आहे .याला विरुपाक्ष मंदिर म्हणतात.
त्याच्या शेजारी असणारे मुख्य मंदिर मात्र बऱ्यापैकी स्थितीत आहे. त्याची रचना सभामंडप , अंतराळ आणि गर्भगृह अशी आहे .अंतराळ चार स्तंभांवर आधारलेले असून त्यांतील दोन पूर्णस्तंभ आहेत. सभामंडप सोळा स्तंभांवर आधारलेला असून त्यातील चार पूर्णस्तंभ आहेत. सभामंडपात दोन देवकोष्टके आहेत, पण ते रिकामे आहेत. याला केदारेश्वर मंदिर म्हणतात.
सभामंडपात अत्यंत सुंदर आणि रेखीव नंदी आहे.
पैकी दक्षिणेकडचे मंदिर बहुधा आधी बांधलेले असावे. आता याची खुप पडझड झाली आहे. कदाचित याची मोडतोड विजापुरच्या किंवा मोघलांच्या आक्रमणात झाली असावी. मंदिराच्या खांबांवर सुंदर अशी शिल्पे कोरलेली आहेत. त्यामधील काही आभासी शिल्पे आहे..
मंदिराच्या दर्शनी भागावर डाव्या आणि उजव्या बाजूस ' मिथुनशिल्पे ' ( कामशिल्पे ) कोरलेली आहेत.
मंदिरासमोर एक कोरीव मानस्तंभ आहे. त्याचा तुटलेला अर्धा भाग समोरच ठेवलेला आहे. त्याच्या शेजारी एक पंचमुखी शिवलिंग आहे. हे सदाशिवाचे अव्यक्त रूप आहे , सदाशिव म्हणजे सद्योजत , वामदेव , अघोर, तात्पुरुष आणि ईशान या शिवाच्या पाच अवस्था दाखवणारी ही प्रतिमा आहे . या पंचावस्थिती म्हणजे पृथ्वी, आग, तेज, वायू, व आकाश.
   शिवाच्या सदाशिव रूपातील अनेक मूर्ती उपलब्ध आहेत, त्या व्यक्त स्वरूपातील आहेत . येथे ही अव्यक्त रूपातील आहे.
मंदिराच्या समोरील परिसरात एक मान तुटलेला नंदी आहे.
एका चौथर्‍यावर शिवलिंग व शेजारी गणेशाची मुर्ती आहे. आम्ही गेलो होतो तो दिवस मंगळवार असल्याने कोणीतरी गजाननाला जास्वंदी वाहिली होती.
महादेव म्हणले कि नंदी आलाच. समोर हि नंदीची सुंदर मुर्ती.
   शेजारी पुष्कळ वीरगळ शिल्पे आहेत त्यातील अनेक वीरगळ वर नक्षीदार काम केलेले आहे.
याच परिसरात अनेक समाध्या आहेत.बहुधा त्या लिगायत समाजातील असाव्यात.
शेजारी एक सुंदरशी ' पुष्करणी' आहे पण देखभाली अभावी सध्या ती नामशेष होण्याच्या मार्गावर आहे.
हे प्राचीन मंदिर सध्या दुर्लक्षित अवस्थेत आहे . या मंदिराकडे सहसा कोणी येत नाही. एके काळी समृद्धीच्या परमोच्च शिखरावर असणारे हे मंदिर सध्या ' एकांतवास ' भोगत आहे. गावापासून दूरवर असणारे हे मंदिर सध्या रिकाम टेकडे, गर्दुल्ले आणि प्रेमीयुगुलांचे विश्रांतीस्थान बनले आहे. काही वर्षांपूर्वी या मंदिराला स्थानिकांनी लोखंडी फाटक बनवून काहीसा संरक्षणात्मक उपाय अवलंबिला असला तरी आजही भरदिवसा येथे स्मशान शांतता अनुभवता येते. परिसरातील लोकांशिवाय इतरांना फारशी माहिती नसल्याने येथे येणाऱ्या पर्यटकांची संख्या अत्यंत कमी आहे. ही कोरीव शिल्पे सध्या अनेक पर्यटकांनी केलेल्या विकृत कृत्यांमुळे रंगहिन बनत आहेत. अनेकांनी आपल्या प्रेमीकांची नांवे कोरून यातील अभिजात शिल्पसौंदर्य बिघडविण्याचा प्रयत्न सुरू केला आहे.
 
 केळवली - साताऱ्यातून परळीमार्गे एक रस्ता पुनवड, निजळ गावांना जातो. या रस्त्यावर कुस बु. गावाजवळून निगूडमाळ गावाला जाण्यासाठी उजवीकडे फाटा आहे. या गावातून सांडवली आणि केळवली धबधब्याकडे जाणारी-(पाऊल) वाट आहे.
सांडवलीला येणाऱ्या पर्यटकांना सांडवलीबरोबरच हा धबधबाही पाहता येऊ शकतो. इथे येण्यासाठी योग्य काळ आहे पावसाळा साधारण संपल्यावरच. कारण सांडवलीपेक्षा या ठिकाणी जंगलही अगदी दाट आहे की ज्यातून वाट काढतच जावं लागतं. शिवाय निगूडमाळपासून, सांडवलीपेक्षा, इथे चालावंही बरंच लागतं. या धबधब्याला आवश्यक नसलं तरी पाण्यातून पलीकडे जाण्याचा आनंदही घेता येऊ शकतो. हे थोर्ड धाडसाचं काम आहे खरं, पण पाणी ओलांडताना एक वेगळीच मजा येते. पण हे धाडस करताना योग्य ती काळजी घेणं आवश्यक आहेच.
निगुडमाळ गावातून पायवाटेने चालायला लागल्यावर डाव्या बाजूला सांडवलीचा पाच टप्प्यांत पडणारा धबधबा दिसतो. उजव्या बाजूला टेकडी आणि मोठी झाडं असल्यामुळे केळवलीचा धबधबा मात्र दिसत नाही. टेकडीला वळसा घातल्यावरच या धबधब्याचा काही भाग दिसू शकतो. धबधब्याकडे जाण्यासाठी त्याच्या वाहणाऱ्या पाण्याच्या काठाने वाट काढत जावं लागतं. सांडवलीप्रमाणे इथेही भरपूर साप, जळू, खेकडे आहेत. शिवाय फुलपाखरांचे अनेक प्रकार इथे पाहायला मिळतात. हा धबधबा सांडवलीइतका उंच नसला तरी मोठा आहे. कोसळणाऱ्या पाण्याचा अंदाज घेऊनच त्याच्या पायथ्यापर्यंत आणि बाजूने माथ्यावर जाता येते. इथे पठारावर केळवली नावाचं छोटंसं गाव आहे. पठारावरून भोवतालचा प्रदेश पाहता येतो. धबधब्याजवळचं वाट काढत पोहोचलो ते जंगल, पाणी कोसळण्याचा आवाज, क्वचित प्रसंगी दिसणारा गवा, भेकर, तरस यांसारखा प्राणी, वाहणाऱ्या पाण्यामुळे तयार झालेली नागमोडी वाट आणि भोवतालचा हिरवागार निसर्ग अगदी मंतरून टाकणारे असतात. या अनुभवासाठी एकदा तरी हा धबधबा पाहायला यायला हवं. ट्रेकर्स मंडळींना माथ्यावरून कास पठारावर जाता येऊ शकेल.
एका दिवसाची थोडीशी साहसी सहल करण्यासाठी हा धबधबा मस्त आहे. या ठिकाणी खाण्या-पिण्याची मात्र कोणतीही सोय नाही.
सातारा-निगुडमाळ अंतर २६ कि.मी. आहे.
 सांडवली धबधबा
हे मंदिर पाहून या परिसरातील शेवटच्या आकर्षणाकडे जाउया, "सांडवली धबधबा". ठोसेघर धबधबा खुप प्रसिध्द झाला असला तरी याच परिसरातील हा धबधबा मात्र फारसा कोणाला माहिती नव्हता. मात्र अलिकडेच तो हि प्रसिध्दीच्या झोतात आला आहे. मात्र इथे जाणे काहीचे दुर्गम आहे. कुस, नित्रळ या गावांमार्गे आपण उरमोडी खोर्‍याच्या शेवट्च्या गावात पोहचतो, निगुडमाळ. इथे बस सेवा नाही. एस.टी. फक्त नित्रळपर्यंतच येते. त्यामुळे आपले वाहन असेल तर सोयीचे जाते. मात्र धबधबा गावातून दिसत नाही.
गावातुन पश्चिम दिशेला चालण्यास सुरवात केली आणि थोडे अंतर गेल्यानंतर चार टप्प्यात पडणारा हा धबधबा दिसायला लागतो. शेतातुन चालत अखेरीस आपण धबधब्यामुळे तयार झालेल्या ओढ्यात पोहचतो. हा ओढा म्हणजेच उरमोडी नदीचा प्रवाह आहे. पुढील वाटचाल या ओढ्यातुनच करायची असते.
कधी काठावरून तर कधी पात्रातुन वाटचाल करित आपण एका मोठ्या धबधब्यासमोर येतो. याच्याही वर अजुन एक धबधबा आहे. मात्र पावसाळ्यात वर चढणारी वाट घसरडी होते आणि वरचा धबधबा पाहता येत नाही. पण आपण जिथवर आलो तो ही प्रवास आनंद देउन जातो.  
हा धबधबा सांडवली गावाच्या हद्दीत येत असल्यामुळे याला सांडवली धबधबा म्हणत असले तरी सांडवली हे खुप दुर्गम गाव असल्याने तिथुन जाणे सोयीचे नाही. एकुणच धबधब्याचे स्वरुप पहाता सामान्य पर्यटकाना ईथे जाणे अडचणीचे वाटु शकेल, मात्र साहसी तरूणांना हा धबधबा नक्कीच साद घालतोय. 
 
 
 
 
 

 नाना फडणवीस वाडा, मेणवली : -

        वाई परिसरातील आवर्जून पहावे असे आणखी एक ठिकाण म्हणजे नाना फडणवीसांनी २४५ वर्षांपुर्वी बांधलेला मेणवलीचा वाडा.वाईपासून सहा किलोमीटर अंतरावर मेणवली हे ठिकाण आहे. या ठिकाणचा घाट आणि नाना फडणवीस यांचा वाडा पेशवेकालीन स्थापत्यकलेचा उत्कृष्ट नमुना आहे. आजच्या काळातही स्थापत्य कलेला प्रेरणा देणारा हा वाडा असल्याचे जाणवते.औंधचे भवानराव त्रंबक पंतप्रतिनिधी आणि साताऱ्याचे रघुनाथ घनश्याम मंत्री यांच्याकडून नाना फडणवीसांना मेणवली गाव देणगी म्हणून देण्यात आले.
नाना फडवणीस यांना वाईच्या पश्चिमेकडील हा भाग इनाम मिळाला. तिथे नानांनी मेणवली हा टुमदार गाव वसविला आणि त्या ठिकाणी कृष्णा नदीकाठी चारसोपी पूर्वाभिमुख भव्य वाडा इ.स१७७० मध्ये बांधला.या वाड्याच्या मागे नाना फडवणीसांनी चंद्रकोरीच्या आकाराचा घाट बांधला आणि विष्णूचे व दुसरे मेणेश्वराचे म्हणजेच शंकराचे अशी दोन देवळेदेखील बांधली.‘धकाधकीच्या राजकारणातून एकांतवास मिळावा म्हणून हा वाडा बांधला, परंतू फार अल्पमुदतीच्या भेटी त्यांनी मेणवलीला दिल्या.
     दीड एकर परिसरामध्ये बांधलेल्या या वाड्यात सहा चौक, दगडी फरशी, दगडी चौथऱ्यावर उत्तम प्रकारच्या सागवान लाकडाच्या सहायाने आणि भित्तीचित्राच्या अनोख्या शैलीने बांधल्या आहेत.
    वाईवरुन येताना रस्त्याला डावीकडे फाटा फुटतो.या फाट्यावर नानांच्या वाड्याची दिशा दाखवणारा फलक आहे.गावातुन पाचच मिनीटात आपण वाड्यासमोर उभे रहातो. आजुबाजुला पार्किंगची सोय केली आहे.    
  या दुमजली व पोटमाळा असलेल्या भव्य वाड्याच्या भोवती दगडी भक्कम भिंत असून सुरवातीला आपल्याला वाड्याचे उत्तराभिमुख भव्य प्रवेशद्वार व नगारखाना दिसतो.
शेजारी वाड्याची माहिती व नकाशा दाखवीणारा फलक आहे.
या भव्य प्रवेशद्वाराच्या वर नगारखान्याची खोली आहे.त्याकाळी बसवलेल्या दरवाज्यातून आत आल्यावर समोर देवड्या दिसतात.वाडा बघण्यासाठी प्रवेशशुल्क आहे तसेच माहिती देण्यासाठी गाईडची व्यवस्था केलेली आहे,
तिकीट काढून आत निघाले की उजव्या हाताला नगारखान्याकडे चढणारा भिंतीच्या आत असलेला जिना दिसतो.
इथून वर चढल्यावर नगारखान्याच्या खोलीत पोहचतो.मात्र आता तिथे नगारे नाहीत.
 यानंतर आपला प्रवेश मुख्य वाड्यात होतो. वाड्यामध्ये हळदी-कुंकू समारंभ, विहिरीचा, मधला, मुख्य, कांडणसाळीचा आणि स्वयंपाकाचा असे सहा चौक आहेत. प्रत्येक चौकाच्या मध्यभागी एक मिटर खोल कुंड आहेत. या कुंडात जमा होणारे पावसाचे पाणी बंदिस्त मार्गाने फिरविले आहे. त्याचबरोबर वरच्या मजल्यांमधून निचरा होणारे पाणी वाड्याच्या पाठीमागील भिंतीतून बंदीस्त पद्धतीने काढल्याचे दिसते. चौकांच्या योजनेमुळे भरपूर प्रकाश व हवा आपातत: वरच्या मजल्यापर्यंत खेळती राहते.
वाड्याच्या बाह्य तटभितींस खिडक्या नाहीत. तात्कालीन संरक्षण गरजानुसार त्या बांधल्या आहेत. या वाड्याला उत्तराभिमुख असणारा दरवाजा सुमारे १५ फूट आहे.
  आतमध्ये प्रवेश केल्यावर डाव्या हाताला ओसरी दिसते जिथे येणारे जाणार्‍या लोकांना बसण्याची व्यवस्था केली जाई.तर डाव्या बाजुला घोड्याच्या पागा आहेत.मात्र त्या बाजुला पर्यटकांना प्रवेश नाही.त्याच्या आतील बाजूस उघड्या सोप्यासमोर कारंजे असून आतील उजव्या बाजूस सुरेख वर्तुळाकार चिरेबंदी पत्थरांत बांधलेली मोठी विहीर आहे.
मग आपण पोहचतो मुख्य चौकात.येथे डाव्या व उजव्या बाजुच्या खोल्या म्हणजे धान्याच्या कोठ्या आहेत.सारा रुपाने गोळा झालेले धान्य येथे ठेवले जाई.
याच चौकात डाव्या बाजुला श्री गजाननाची छोटी कोरीव मुर्ती आहे,
जवळच नाना फडणवीस यांचे जीवनचरित्र लावले आहे.
वाड्यात प्रवेश करण्यापुर्वी डाव्या हाताला कोपर्‍यात असणार्‍या बुरुजावरुन नजारा बघायचा. या बुरुजाला जंग्या आणि तोफे डागण्यासाठी खिडक्या कोरल्या आहेत.मात्र सध्या तोफा दिसत नाहीत.
वाटेत वाड्याची देखणी प्रवेशद्वारे दिसतात.
या बुरुजावर चढणारी वाट अरुंद असली तरी वरुन मेणवली गावाचा नजारा दिसतो आणि पार्श्वभुमीवर पांडवगडाचा सुळका दिसतो.
हाच बुरुज मागच्या बाजुने असा दिसतो.
मुख्य वाडा आतून बघण्यासाठी पुन्हा मुख्य चौकात यायचे.ईथे उजव्या हाताला एक पाटी दिसते.
वाड्याचा काही भाग हा पर्यटकांसाठी बंदिस्त केला आहे.
भिंतीस असलेल्या खड्या जिन्याने वरच्या मजल्यावर जायचे.
काही दालन ओलांडून आपण पंगतीच्या चौकाच्या वरच्या सज्जात असतो.अर्थात वाड्याच्या या भागात प्रवेश नसल्यामुळे हा चौक वरुनच पहाता येतो.
याच चौकाच्या शेजारी दप्तराची खोली आहे.तिथे बैठक व लिखाणाचे टेबल ठेवलेले दिसते.यानंतर आपण एका महत्वाच्या दालनात येतो.
या वाड्याच्या चुना, विटांमध्ये बांधलेल्या भिंतीं आतील बाजूला जाड गिलावा दिलेला आहे. भाताचा पेंढा किंवा गवताचे कांडे चिकट लाल मातीच्या चिखलात मिसळून ते मिश्रण लिंपून हा गिलावा तयार केला आहे. भित्तीचित्रणासाठी भिंत सुकविताना पॉलिश करुन गुळगुळीत केली आहे.
येथील चित्रांची मांडणी व रेखाटन मराठी शैलीचे आहे. यामध्ये दशवताराचा, अष्टविनायकाचा समावेश आहे.
याच दालनाच्या शेजारी नाना फडणवीस यांचे शेजघर आहे.उन्हाळ्यात वारा घालण्यासाठी हाताने चालवायचा पंखा आपण येथे पाहु शकतो.याच्याच शेजारी खलबतखान्याची छोटीशी खोली आहे.तिथे आता प्रोजेक्टरची व्यवस्था केली आहे.
यानंतर आपण जीना उतरुन हळदी-कुंकू समारंभाच्या चौकात येतो.
हळदी-कुंकू समारंभाच्या चौकातील भिंतीवर जय-विजय हे द्वारपाल रेखाटले आहेत. तेथे जिवती देवीचे चित्रही आहे. त्याचबरोबर गवळणींच्या खोड्या काढणारा कृष्णही येथे दिसतो.
छतातील लाकडात कोरलेल्या सुंदर वेलबुट्टीसही लाल रंग दिला आहे. हा रंग उत्साहवर्धक वातावरण निर्मिती करतो.
या ठिकाणी एकाच दगडात घडविलेले अत्यंत सुंदर आणि आकर्षक कमळाच्या फुलाच्या अकारातील कारंजे आहे. हा कारंजा रहाट गाडग्यावर चालविला जात होता. त्याचबरोबर एकाच दगडामध्ये तयार केलेला पाण्याचा कुंडही येथे पहायला मिळतो.याठिकाणी वाड्याचा जो भाग पर्यटकांसाठी उपलब्ध आहे,त्याची फेरी पुर्ण होते.
हा वाडा मराठा वास्तूशैलीत बांधला आहे. उंच तटबंदीने धूळविरहित केला आहे. त्यात हवा खेळती राहिल आणि पुरेशा प्रकाशाचाही व्यवस्था केली आहे नाना फडणवीसांनी मेणवली येथे बांधलेला वाडा आजही ऊन, वारा, पावसात दिमाखात उभा आहे.  १७७० च्या दरम्यान बांधलेल्या या वाड्याची देखभाल त्यांचे खापर पणतू अशोक फडणीस आजही करीत आहेत.
     या वाड्याच्या मागे अत्यंत प्रशस्त देखणा, रमणीय आणि उत्कृष्ट वास्तूशास्त्राचा नमुना असणारा कृष्णा घाटही नानांनी बांधलेला आहे.या घाटाच्य दिशेने निघाले कि सर्वप्रथम नजरेस पडतो तो भव्य विस्ताराचा दुर्मिळ असलेला डेरेदार गोरख चिंचेचा वृक्ष.यालाच बॅओबाब म्हणतात.मुळचे अफ्रीकेत उगवणारे हे झाड  शेकडो कि.मी दुर मराठी मातीत रुजले आहे. एखाद्या हत्तीच्या पायासारखा दिसणारा याचा बुंधा पर्यटकांचे आकर्षण आहे.
  या वाडय़ाच्या मागे प्रशस्त, देखणा, रमणीय आणि उत्कृष्ट वास्तुशास्त्राचा नमुना असणारा कृष्णा घाटही नानांनी बांधलेला आहे. पूर्वाभिमुख असणारे लक्ष्मी-वासुदेव म्हणजे मेणेश्वर मंदिराच्या सभागृहाच्या छतावर व गलथ्यावर भित्तीचित्रे शिल्लक आहेत.
फिकट पिवळ्या रंगाने छत रंगविले आहे. त्याच्या मध्यभागी समभूज चौकनात सुंदर पानाफुलांच्या वेलबुट्टींची चित्रेकाढली आहेत. बेलबुट्टी लाल व हिरव्या रंगात आहेत. मराठा स्थापत्य शैलीचे छत सुशोभीकरणाची प्रचलित शैली होय.
कृष्णेच्या घाटावरील त्या मंदिरांच्या परिसरात गेले, की सर्वप्रथम एक छोटेसे देऊळ दृष्टीस पडते. ते विष्णू व शंकर यांच्या देवळांच्या मानाने खूपच लहान असून घंटेचे देऊळ म्हणून ओळखले जाते. त्या देवळाचे विशेष म्हणजे त्यात फक्त एक भलीमोठी घंटा टांगली आहे. पंचधातूंपासून बनवलेल्या त्या घंटेचे वजन सहाशेपन्नास किलोग्रॅम एवढे असून, त्यावर लहानग्या जिझसला कडेवर घेतलेल्या मेरीचे चित्र व 1707 हे साल कोरलेले आहे. ती घंटा बघितल्यावर जिझस आणि मेरी यांचे चित्र कोरलेली घंटा देवळाच्या परिसरात का ठेवली, ती एखाद्या चर्चमधील घंटा आहे का, तिच्यासाठी वेगळे मंदिर का बांधले असे  प्रश्न पडतात.  
    बाजीराव पेशव्यांचे धाकटे बंधू चिमाजी अप्पा यांच्या नेतृत्वाखाली मराठय़ांनी पोर्तुगीजांचा १७३९ मध्ये पराभव केला अर्नाळा, वसई असे काही किल्ले जिंकून ताब्यात घेतले. त्या किल्यांमध्ये व आसपासच्या परिसरात पोर्तुगीज कालीन चर्चेस असून, त्यामध्ये मोठमोठय़ा आकाराच्या खूप घंटा होत्या. चिमाजी अप्पांच्या सैन्याने वसईच्या किल्ल्यातील चर्चमधील घंटा काढल्या व पोर्तुगीजांवर मिळवलेल्या विजयाचे प्रतीक म्हणून त्या हत्तीवरून वाजतगाजत गावात मिरवल्या.
   अशा घंटा नाशिकच्या शंकराच्या देवळात, मुरुडच्या दुर्गादेवी मंदिरात, भोरगिरी येथील भीमाशंकराच्या देवळात आढळतात. सुमारे  चारशेपेक्षा जास्त वर्षे जुन्या अशा त्या घंटा सुस्थितीत आहेत. मेणवली येथे मात्र त्यातील घंटा देवळात न लावता त्या घंटेसाठी वेगळे मंदिर बांधले गेले आहे. तेच मेणवली गावचे वैशिष्टय़ ठरले आहे. घंटेच्या मंदिरामुळे कृष्णाकाठच्या देवळांच्या रम्य परिसराला एक प्रकारचे वेगळेपण लाभले आहे.
घाटाच्या भिंतीवर कोनाडे आहेत.दिवाळी,त्रिपुरारी पौर्णिमा आणि इतर प्रसंगी ईथे दिवे लावून घाट पाजळला जात असावा.
वाड्यातील स्त्री-वर्गाला घाटावर स्नानासाठी जाण्यासाठी मागील बाजूस स्वतंत्र व्यवस्था केली आहे. नाना फडणीसांनी त्याच्याकडे असलेल्या काही मौल्यवान वस्तू, कागदपत्रे अखेरच्या दिवसांत इथे सूरक्षितत्तेच्या दृष्टिकोनातून आणून ठेवली होती. कृष्णाकाठी असलेला वाडा पूर्वाभिमुख असून त्याच्या पश्चिमेकडे म्हणजेच वाडय़ाच्या मागील बाजूने कृष्णेत उतरण्यासाठी घाट आहे.
येथे जाण्याचे मार्ग :
 पुणे – खेड शिवापूर – शिरवळ – खंबाटकी घाट – सुरुर – वाई – मेणवली.
अथवा
पुणे – खेड शिवापूर – भोर – मांढरदेवी घाट – वाई – मेणवली.

कल्याणगड उर्फ नांदगिरी

 सातारा शहराच्या पूर्वेला नजर टाकली कि सह्याद्रीची शंभु महादेव डोंगररांगेचे दृष्य दिसते. अगदी डावीकडे उत्तरेला चंदन-वंदन हि दुर्गजोडी,भुताची टेकडी,जरंडेश्वराचा उत्तुंग पहाड, दुर क्षितीजावर वर्धनगड, पाटेश्वराचा डोंगर परिसर्,जानाई-मळाई डोंगर अशी प्रचंड मोठी पसरलेली रांग दिसते. याच रांगेत सपाट माथ्याचा,कातळकडे असलेला आणि माथ्यावर एका प्रचंड वृक्षाचा तुरा असलेला डोंगर लक्ष वेधून घेतो.हल्ली या परिसरात मोठ्या प्रमाणात पवनचक्क्यांची उभारणी झाली आहे. पवनचक्क्यांचा गराडा या गडाला पडलेला आहे.शिलाहारकालीन प्राचीन खुणा वागवणारा हा गड आहे कल्याणगड उर्फ नांदगिरी.
या किल्ल्याच्या इतिहासात डोकावल्यास ,कल्याणगडाचेच दुसरे नाव म्हणजे ‘नांदगिरीचा किल्ला’ सातारा येथे सापडलेल्या ताम्रलेखानुसार शिलाहार राजा दुसरा भोज याने या किल्ल्याची निर्मिती केली. हा किल्ला इ.स. ११७८ ते इ.स. १२०९ या कालावधीत बांधला गेला असावा. शिलाहाराच्या सापडलेल्या अनेक ताम्रपटावरून असे दिसते की शिलाहार राजांनी जैन लोकांना अनेक दानधर्मे केली, आणि कल्याणगडावरील गुहेत असणाऱ्या पार्श्वनाथाच्या मूर्तीवरून ह गडा शिलाहारांनी बांधला असावा हे सिद्ध होते. इ.स. १६७३ मध्ये शिवरायांनी सातारा व आजुबाजूचा प्रदेश जिंकून घेतला. त्यातच कल्याणगडाचा देखील समावेश होता. पुढे शिवकालानंतर याचा सर्व कारभार प्रतिनिधींकडे सोपवला गेला. इ.स. १७७३ मध्ये पहिले बाजीराव पेशवे व श्रीपतराव प्रतिनिधी यांच्यामध्ये शाहु महाराजांच्या दरबारी तंटा सुरु झाला.त्यानंतर त्याची व्यवस्था प्रतिनिधींकडून काढून पेशव्यांकडे दिली गेली.
 इ.स. १७११ मध्ये मेजर प्राईस याने किल्ल्याचे वर्णन असे केले आहे,'दुरुन हा किल्ला एखाद्या मोठ्या गलबताप्रमाणे दिसतो.याच्यासमोर एक टेकडी आहे व माथ्यावर बरीच देवस्थाने आहेत'. इ.स. १८१८ मध्ये एप्रिल महिन्यात लढाई  न करता हा गड जनरल प्रिझलरच्या हातात आला.पुढे १८६२  मध्ये इंग्रज सरकारने किल्ल्यांची यादी केली त्यात या किल्ल्यासंदर्भात असे लिहीले आहे कि या किल्ल्याची पडझड झाली आहे,परंतु किल्ल्यात पाणी व दुसरी काही सामग्री नाही'.पण आर.कुक असे लिहीतो कि 'या किल्ल्यासंदर्भात मुख्य चांगली गोष्ट अशी कि येथे पाण्याची सुबत्त्ता आहे.' मराठी राज्यांत हा किल्ला एका तालुक्याचें ठिकाण होतें व येथें खजीना आणि मामलतदार, फडणवीस, सबनीस, हवालदार, दफ्तरदार, २ कारकून, ३ नाईक आणि १६० शिपाई रहात असत. येथील दोन तोफा १८५७ सालच्या बंडांत हलविण्यांत आल्या.
 गडावर जावे कसे ?
कल्याणगड हा सातारा विभागात मोडणारा किल्ला आहे. साताऱ्यापासून अर्ध्या दिवसात हा किल्ला  पाहून येऊ शकतो. या परिसरातील किल्ले हे मुख्य डोंगररांगेपासून अलग झालेल्या डोंगरावर विराजमान झालेले आहे. या किल्ल्याचे वैशिष्टय म्हणजे चढण्यास सर्वात सोपा. संपूर्ण प्रदेश ऊसामुळे सधन झालेल्या शेतकऱ्यांचा प्रदेश. त्यामुळे एस.टी.ची सोय देखील उत्तम प्रकारची आहे.सातारा शहरापासून सातारा रोड रेल्वे स्टेशनकडे जाणारा मार्ग, महामार्ग ओलांडून जातो. या मार्गावर एस.टी. बसेसची सोय आहे. किंवा पुणे-मुंबईहून रेल्वेनेही येऊन सातारा रोड रेल्वेस्थानकावर उतरता येते. येथून चालत नांदगिरी ऊर्फ कल्याणगडाचा पायथा गाठता येतो. सातारा रोड रेल्वे स्थानकापासून हे अंतर तीन किलोमीटर आहे. किल्ल्यावर जाण्यास एकच वाट आहे. ही वाट पायथ्याच्या नांदगिरी (धुमाळवाडी) गावातून वर येते. सातारा एस.टी स्थानकावरून सातारा रोडला जाणारी गाडी पकडावी. सातारारोड ते नांदगिरी हे ३ कि.मी.चे अंतर आहे. येथून किन्हईकडे जाणारी बस पकडावी किंवा एकदम सातारा ते किन्हई बसने नांदगिरीला उतरावे. गावातून गडावर जाण्यास ४५ मिनिटे लागतात. 
गडाशेजारच्या डोंगरावर आता पवनचक्क्या झाल्याने त्याची सामग्री नेण्यासाठी कच्चा गाडीरस्ता जवळपास माथ्यापर्यंत गेला आहे.नांदगिरी गावाच्या अलिकडे हा रस्ता गडाकडे जातो.
या रस्त्याने मोटारसायकल सारखे दुचाकी वाहन किंवा जीपसारखे चारचाकी वहान जाउ शकते.मात्र कारसारखे वहान रस्त्याची अवस्था बघता थेट वरपर्यंत न नेणेच योग्य. तसाही कोणत्याही गड पायी चढला तरच त्यात मजा.
गडावर बघण्यासारखी ठिकाणे :-
 समुद्रसपाटीपासून ३५३७ फुट उंचीवर असणारा हा किल्ल्यावर नांदगिरी गावातून जाणार्‍या पायवाटेने निघालो कि सुरवातीला काही नव्याने बांधलेल्या पायऱ्या आहेत. गावात असलेल्या शाळेपासून अर्धा किमी सपाट अंतर चालून गेल्यावर किल्ल्याची चढाई सुरु होते.
सुरवातीच्या पायऱ्या संपल्यानंतर वाट मुरवाड अशी आहे. या वाटेने आपण चढून उजवीकडील डोंगरदांडावर येतो. या मार्गावर दिशा दाखवण्यासाठी पिवळ्या रंगाचे बाण जागोजाग रंगवलेले असल्यामुळे रस्त्यात भरकटण्याची शक्यता नाही. 
या दांडावर आल्यानंतर अर्ध्याडोंगरात एक कोरलेली गुहा आहे. आत पाच सहा दगडी खांब आहेत. यात सध्या पाणी भरलेले आहे. डावीकडे हनुमानाची प्रतिमा कोरलेली. आतील खांबावर मनुष्यसदृश्य प्रतिमा कोरलेली. 
येथून पुढे गडावर जाणारे विजेचे खांब लागतात. या खांबांना धरुनच वाट गडावर पोहोचते.
महाराष्ट्र माउंटनिअर्स रेस्क्यू कोऑर्डीनेशन सेंटर  (MMRCC) चा गिरीप्रेमी संस्थेने लावलेला फलक दिसतो. 
गडाचा खडा चढून माथ्याजवळ आलो कि किल्ल्याची तटबंदी जवळ आलेली दिसते.
डाव्या बाजूला किल्ल्यावर जायला रेलिंग ची जोड असलेल्या दगडी पायऱ्या.
गडमाथ्यावर जाण्याआधी उजवीकडे गेलो तर  समोर कातळात खोदलेल्या एक विस्तीर्ण गुहा दिसते.कोणीतरी तिथे शंकराची मूर्ती ठेवलेली.
धुमाळवाडीतून येणारा कच्चा गाडी रस्ता इथपर्यंत येतो. दुचाकीच नाही तर जीप इथपर्यंत येते. परिसरातील ग्रामस्थ असे सांगितात की कल्याणगडावर पवनचक्की उभारायची होती. ग्रामस्थांनी विरोध केला. समोरच्या डोंगरावर पवनचक्की उभारायला संमती दिली. धुमाळवाडी पासून कल्याणगडावर येणारा रस्ता करून घेतला.
इथून जैन मंदिराकडे जाण्याचा मार्ग दाखवणारी खुण आहे.
किल्ल्यावर जाण्यासाठी उजवीकडच्या दगडी पायऱ्या चढायला सुरुवात करावी. पूर्व बाजूला असला तरी उत्तराभिमुख असा कल्याणगडाचा पहिला दरवाजा आहे. या दरवाजाच्या खालच्या पायऱ्यांचा दुरुस्तीचे काम सध्या चालू आहे. दरवाज्याला लोखंडी दार! एका बाजूला फिरता दरवाजा (Revolving door). नक्षीदार दरवाजा आणि फिरते गेट छान दिसते. नांदगिरी उर्फ कल्याणगड तसा आडवाटेवरचा किल्ला! पण या किल्ल्याला भेट देणार्या किल्ले प्रेमी मंडळीपेक्षा भक्त मंडळीच मोठ्या संख्येने असतात.सहाजिकच या सोयी केलेल्या आहेत.
दरवाज्यातून आत गेल्यावर बाहेरील सुंदर हरित निसर्ग 
दरवाज्यातून आत वळताना समोरच मंदिराकडे जाण्याची खुण दिसते. डावीकडे वळल्यावर एक खोली होती. खोली समोर लेणी अर्थात गुफामंदिराकडे जाण्याचा मार्ग!
मार्गावर उजवीकडे नंदीशिल्प आणि छोट शिवमंदिर!
श्री. १००८ पार्श्वनाथ दिगंबर जैन गुफा मंदिर अर्थात लेणीत खाली जायला खाली काही पायऱ्या दिसतात.
ईथे खरा थरार सुरु होतो. पादत्राणे आणि सॅॅक बाहेरच ठेवावीत.हातात  टॉर्च घ्यावा आणि एक अविस्मरणीय अनुभव घ्यायला सज्ज व्हावे.या गुहेत शिरण्या अगोदर काही काळजी घेणे क्रमप्राप्त आहे. या कड्यातील गुहेचे जे तोंड आहे. याच्यावर आठ दहा फूट ते वीस फूट उंची वर मधमाशांची एक दोन पासून पाच सात अशी पोळी लटकलेली असतात. कांदा – लसूण अथवा धुम्रपान याने मोहोळ उठण्याची शक्यता असते. गुहेमधे पूर्णपणे अंधार आहे. त्यामुळे टॉर्चच्या उजेडातच आत शिरावे लागते. गुहेमधे पाणी आहे. हे पाणी पिण्यासाठी वापरले जाते. त्यामुळे चप्पल बूट बाहेर काढूनच आपल्याला आत जावे लागते.
पावसाळ्याच्या काळात गेले तर या लेण्यात पाणी भरलेले असते.कदाचित ते छाती किंवा त्याच्याही वर मानेपर्यंत असते.त्यामुळे जाण्याचे धाडस होईल असे नव्हे.तेव्हा या गडावर उन्हाळ्यात आल्यास पाणी पातळी कमी असल्यामुळे सहजगत्या आतपर्यंत जाउ शकतो. गुहेच्या मुखापाशी पोहचून समोर नजर टाकली तर फक्त अंधार, काहीच दिसत नाही.मात्र थोडे धैर्य एकवटून पुढे निघालो आणि टॉर्चा उजेड पुरेसा असेल तर पुढची मार्गक्रमणा अवघड नाही.मात्र ईथे पुरेसा प्रकाश देणारा टॉर्च सोबत बाळगावा.मोबाईलचा उजेड पुरेसा होत नाही.तेव्हा पुर्ण तयारीने ईथे गेलेले बरे.
अगदी एन उन्हाळ्यात देखील ईथे गुढगाभर पाणी असते.तसेच गुहेचे छ्त मध्येच उंच आहे आणि बाजुला त्याची उंची कमी होते.
आपल्या वाटेच्या दोन्ही बाजुला खोल डबकी आहेत.येणारा यात्री चुकून तिकडे जाउ नये म्हणुन दोन्ही बाजुला रेलिंग लावलेली आहेत.त्यामुळे वाट चुकण्याचा प्रश्न येत नाही.सध्या गुहेतील वाट बांधून काढण्याचे काम गावकर्यांनी सुरू केलेले आहे. ते पूर्णही होत आले आहे.
गुहेचे छत मात्र समपातळीत नाही,त्यामुळे मध्येच ते एका ठिकाणी खाली आले आहे.सहाजिकच सर्वत्र लक्ष ठेवून जपूनच हि वाटचाल करायची. आजुबाजुला नैसर्गिक तयार झालेले खांब दिसतात. गुहेला असे खुप फाटे फुटले आहेत.एकंदरीत अश्या बावीस गुहा आहेत अशी माहिती स्थानिक लोक देतात.म्हणजे नांदगिरीचा माथा जवळपास या गुहांनी पोकळ झाला आहे.
साधारण २५ ते ३० मीटर म्हणजे शंभर फुट अशी वाट्चाल केल्यावर आपल्याला गुहेचे शेवटचे टोक सामोरे येते.लेण्याच्या समोरच्या टोकाला उजवीकडे १००८ व्या पार्श्वनाथांची तपोवस्थेतील काळ्या पाषाणातील मूर्ती दिसते. हि मुर्ती इ.स नवव्या शतकात घडवलेली असून स्थानिक लोक तीलाच 'पारसनाथ' म्हणतात. मुर्तीभोवती एक छोट मंदिर उभारलेले आहे.. मंदिराला लोखंडी चौकट केली आहे. 
याशिवाय लेण्यात दत्तात्रेयाची संगमरवरी मूर्ती आणि देवीची मूर्ती आहे.हे भुयार आणखी लांब होते असे स्थानिक लोक सांगतात.मात्र भिंत बांधून ते आता बंद केले आहे.या गुहेत पाच पांडवाच्या कोरीव मुर्ती आहेत असे स्थानिक सांगतात.
लेण्यातील हा थरारक अनुभव सोबत घेउन पुढील किल्ला पाहण्यासाठी निघायचे.पायर्‍या चढून पुन्हा आधीच्या जागी येउन डावीकडे वळल्यावर किल्ल्याचा दुसरा दरवाजा दिसतो.वरचा दरवाजा पूर्वाभिमुख असून दोन्हीकडून बुरुजांनी संरक्षित केलेला आहे. 
ह्या दुसऱ्या दरवाजाच्या आतून फोटो.
या दरवाजाच्या आत गेल्यावर उजवीकडे फार सुंदर  चपेटदान मारुतीचे मंदिर आहे. शिखरावर गणपतीची मूर्ती बसवलेली आहे.निनामपाडळीच्या दहाने बुवांनी या मंदिराचा जीर्णोध्दार केला. इथेच जवळ बामणघर नावाच्या वास्तुचे अवशेष दिसतात.
मंदिराला वळसा घालून गडमाथ्यावर जाणाऱ्या पायऱ्या.
गडमाथ्यावर काही पाणतळी दिसतात. अर्थात पाण्याचा उपसा होत नसल्याने तळी शेवाळलेली आहेत.
या तळ्याच्या काठावर  मंदिर आहे.मंदिरात अनेक देवतांच्या मुर्ती पहण्यास मिळतात.मंदिराच्या डावीकडे कड्यावर एक गोलाकार पर्णकुटी उभारून सध्या एका महाराजांनी मठ स्थापन केलेला आहे.कल्याणगडाचा माथा दक्षिणोत्तर पसरलेला असून आटोपशीर आहे. माथ्यावरील एका वास्तुचे नुतनीकरण करून भक्त मंडळीसाठी निवासस्थान उभारलेले आहे. या वास्तू समोरच एक समाधी असून बाजूला पाण्याचे मोठे तळे आहे. पाण्याचा उपसा नसल्यामुळे पाणी शेवाळलेले आहे. 
याच वाटेवर आपल्याला एक तलवारीचे शिल्प बघायला मिळते.निजामशाही राजवटीतील कोणाचे तरी हे थडगे असावे.माथ्यावर वाड्याचे व शिबंदीच्या घरट्यांची जोती आहेत. 
मध्यभागी वडाचे मोठे झाड आहे. हेच झाड आपल्याला खुप लांब अंतरावरुन दिसु शकते.झाडाखाली कबर आहे. दक्षिण टोकावर कोरडे पडलेले पाण्याचे टाके आहे. हे पीराचे स्थान कोण्या अब्दुल करीमचे आहे, असे सांगितले जाते.मात्र हा अब्दुल करिम कोण ? याचा पत्ता लागत नाही.होळी पौर्णिमेच्या आधी चार पाच दिवस या पीराचा उरुस भरतो.आजुबाजुचे उध्वस्त अवशेष बघीतले कि ईथे एखादे मंदिर असावे अशी खात्री पटते.

कुबडीतीर्थ रामघळ :-

         स्मारक बघून झाले कि पुढे सडा दाढोली परिसरात असणारी रामघळ बघावी.शिंगणवाडीच्या पश्चिमेला एक कातळ टोपी घातलेल्या डोंगर दिसतो.याच डोंगरात रामघळ हि अफलातून जागा आहे. चाफळपासून एक-दोन डोंगर ओलांडून साधारण दोन तासाच्या पायपिटीने चालत रामघळीत जाता येते.म्हणजे हा तर झाला एक छोटा ट्रेकच. अर्थात पायी जायचे नसल्यास रामघळीपर्यंत जाण्यासाठी कच्चा गाडी रस्ता आहे. रामघळ ज्या डोंगरात आहे त्या डोंगराच्या पठारावर पवनचक्क्या बसवलेल्या आहे. या पवनचक्क्यामुळे एक कच्चा गाडी रस्ता थेट रामघळीच्या वर असणाऱ्या पठारावर गेलेला आहे. डोंगरावर जाऊन गाडी लावली की फक्त १०० पायऱ्या उतरून रामघळीत पोहोचता येते.  
        चाफळ राममंदिराजवळून जाणारा मुख्य रस्ता पुढे पाटणला जातो आणि कराड-चिपळूण रस्त्याला जोडतो.  रामघळीला जाण्यासाठी चाफळ-उंब्रज मुख्य रस्त्यावर यावे आणि चाफळकडे न वळता डावीकडे पुढे पाटण-साताऱ्याकडे जाणारा रस्ता धरला. या रस्त्यावर चाफळ पासून फक्त १.५ किलोमीटर अंतरावर गमेवाडी नावाचे गाव लागते. या गावात समोर जाणारा डांबरी रस्ता सोडायचा आणि डावीकडे वळायचे. मग पुढे डेरवण ==> मधलीवाडी ==> वाघजाईवाडी ==> दाढोली अशी छोटी छोटी गावे आणि घाटाचा वळणावळणाचा रस्ता ओलांडत दाढोली गावानंतर साधारण ५०० मीटर अंतरावर डांबरी रस्त्याला डावीकडे एक वळण घेतले. येथे वळणावर सुरवातीलाच "रामघळ कुबडीतीर्थ, सडादाढोली ३ कि.मी." असा बोर्ड लावलेला दिसतो आणि आपण बरोबर रस्त्यावर आहोत याची खात्री पटते. पण इथून पुढे मात्र ३ किलोमीटरचा रस्ता बराच खराब, लाल मातीचा आणि रामघळ ज्या डोंगरात आहे त्या डोंगराच्या कातळटोपीच्या बाजूबाजूने एका मोठ्या सड्यावर (पठारावर) जातो. ह्या रस्त्यावर गाडी अतिशय जपून चालवावी कारण अधेमधे मोठमोठ्या दगडांनी आपली डोकी वर काढलेली आहेत. थोडं सांभाळून गाडी चालवत हा रस्ता पार केला आणि दुपारच्या कडक उन्हात सुद्धा पठारावरच्या थंडगार वाऱ्याने आमचं स्वागत होते. पठारावर सगळीकडे लांबच लांब पवनचक्क्यांचे राज्य आहे. येथेच डोंगरकड्यालगत लांबून काही रेलिंग लावलेले दिसले आणि त्याच्या जवळच दिसते रामघळीची स्वागत कमान.
रामघळीचे प्रवेशद्वार
“रामघळ प्रवेशद्वार” असे लिहलेल्या कमानीतून घळीमधे उतरणाऱ्या जांभ्या दगडाच्या पायऱ्या सुरु होतात. ह्या परिसराचा पर्यटनाच्या दृष्टीकोनातून विकास होत आहे. परिसरात माकड, वाघ, हरीण अशा प्राण्यांचे अनेक प्रतीकात्मक पुतळे ठेवलेले आहेत. साधारण १० पायऱ्या उतरल्यानंतर डोंगरकड्याला लाकडी रेलिंग लाऊन आजूबाजूचा डोंगरदऱ्यांनी नटलेला सुंदर परिसर पाहण्यासाठी छान पॉइंट बनवला आहे. येथेच एका उंच दगडावर समर्थ रामदास आणि शिवाजी महाराज यांचा भव्य पुतळा उभा केलेला आहे. हा सर्व परिसर न्याहाळत जसं जसे आपण पायऱ्या उतरु लागतो तसा अचानकच हवेतला थंडपणा जाणवायला लागतो. बाजूच्या कातळाला आधारासाठी थोडा जरी स्पर्श केला तरी तो नुकताच फ्रीज मधून काढून तिथे ठेवल्यासारखा थंड लागतो. साधारण ५० ते ६० पायऱ्या उतरून मुख्य डोंगर आणि त्याच्या शेजारी पडलेल्या एका विशाल शिळेमुळे तयार झालेल्या नैसर्गिक कमानीतून आपण रामघळी समोर येऊन पोहोचतो.

सुशोभीकरणासाठी लावलेले लाकडी रेलिंग
 
रामघळीत उतरणार्‍या पायर्‍या
डोंगरामध्ये राहणाऱ्या रामदासांना एकांत प्रिय होता. त्यामुळे महाराष्ट्रात समर्थांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या अनेक घळी व गुहा आहेत. त्यापैकीच एक हि चाफळ किंवा शिंगणवाडीची रामघळ. समर्थांचे हे अत्यंत आवडते ठिकाण. त्यांचे बरेचसे लेखन याच घळीत झाले. चाफळ येथील श्रीराम मंदिराच्या पश्चिमेकडील डोंगरावर ही घळ आहे. ह्या घळीत काही काळ समर्थांचे वास्तव्य होते. घळीतून समोरच चाफळच्या राममंदिराचे दर्शन होते. म्हणूनच बहुदा "दास डोंगरी राहतो, यात्रा रामाची पाहतो' असे म्हटले असावे. सह्याद्रीच्या कुशीत निसर्गरम्य ठिकाणी असलेल्या या घळीत अनुभवता येते ती म्हणजे फक्त आणि फक्त निरव शांतता. इतका पवित्र आणि शांत परिसर कि तोंड उघडून शांतता भंग करण्याची इच्छा देखील होत नाही.
    घळीच्या समोर बरीच मोकळी जागा आहे. घळ दुमजली असून बाहेरूनही दोन मजले स्पष्ट दिसतात. घळीच्या डाव्या हाताला एक मोठे विवर आहे. येथे आत गेल्यावर वर्तुळाकार जागा आहे. हीच समर्थांची ध्यानस्थ बसण्याची जागा. हि घळ म्हणजे डोंगरात खोदलेलं एक भन्नाट लेणं. भर दुपारच्या उन्हात सुद्धा घळ इतकी थंड कि थोड्याच वेळात नाकातून पाणी यायला लागत. घळीमधे प्रवेश करण्याआधी चपला काढव्यात. तिथल्या खडकावर पाय ठेवताच थंडीमुळे सणक डोक्यात जाते. घळ खूप स्वच्छ ठेवलेली आहे त्यामुळे इथले वातावरण मन प्रसन्न करते. मुख्य घळीमधे आत दोन छोट्या गुहा आहेत. उजव्या बाजूच्या गुहेत सदगुरु जनार्दन महाराज (वसंतगडकर) यांची साधना गुंफा आहे. या गुहेत जनार्दन महाराज यांचा पुतळा आहे. तर डाव्या हाताच्या गुहेत शिवाजी महाराज आणि समर्थ रामदास यांच्या भेटीची जागा म्हणून त्यांच्या छोट्या मूर्त्या ठेवलेल्या आहेत. घळीच्या गवाक्षामधून समोर दूरवर पसरलेला डोंगरदर्यांनी व्यापलेला परिसर खूप सुंदर दिसतो.
या रामघळी संदर्भात एक कथा सांगितली जाते. सदाशिवशास्त्री येवलेकर नावाचे विद्वान दिवसा मशाली लावून अन जानव्यास सुरी बांधून फिरत होते. आपल्या पांडित्याच्या जोरावर समोर आलेल्या विद्वानाचा पराभव करित त्यांचे भारतभ्रमण सुरु होते.जर वादविवादात पराभव झाला तर मशाल विझवून जानव्याला बांधलेली सुरीने जीभ कापून घ्यायची त्यांची तयारी होती. पण विद्वत्तेच्या अभिमानाचे रुपांतर घमेंडीत झाले. फिरत फिरत हे शास्त्रीबुवा चाफळला आले. त्यांना समर्थ रामदास स्वामींविषयी समजले.मात्र समर्थ चाफळला नव्हते.ते या शिंगणवाडीच्या घळीत होते. म्हणून शास्त्रीबुवा शिंगणवाडीचा डोंगर चढून आले तो शिळा असलेल्या जागी त्यांची भेट समर्थांशी झाली.शास्त्रीबुवांनी तिथेच समर्थांना वादविवादाचे आवाहन दिले.समर्थांनी सुरवातीला नकार दिला.मात्र सदाशिवशास्त्री आग्रह सोडेनात.मग जवळून जाणार्‍या मोळीविक्याला त्यांनी हाक मारली.समर्थांनी त्याच्या वाटेत काठीने तीन रेघा आखल्या. त्या ओलांडून आलेल्या मोळीविक्याने वादविवादात सदाशिवशास्त्रींचा पराभव केला. पराभव मान्य केलेल्या सदाशिवशास्त्रींना समर्थांनी आपल्या संपद्रायात सामिल करुन घेतले.शिरवळजवळील कणेरी मठात त्यांना मठपती केले.
   याच घळीजवळ भैरववाडी लागते.एकदा समर्थांसाठी विड्याची पाने आणायला चाफळला गेलेल्या कल्याणस्वामीना सर्पदंश झाला. तेव्हा समर्थांनी भैरववाडीतील भैरवाला साकडे घातले.
  याच परिसरात कुबडीतीर्थ आहे. यासंदर्भात एक कथा अशी सांगितली जाते कि ईथे शिवाजी महाराज आणि समर्थ रामदास यांची भेट झाली,तेव्हा ते दोघे बोलत पुढे गेले असता शिवरायांना तहान लागली. तेव्हा रामदास स्वामींनी हातातील कुबडीने एक दगड उलथवून येथील झर्‍याचे पाणी त्यांना प्यायला दिले.हा झरा अजूनही वाहताच आहे.याला कुबडीतिर्थ म्हणतात. ईथेच एक मारुतीची घुमटी आहे.
रामघळीचे हे फोटो पाहून भविष्यात या ठिकाणाला भेट देणाऱ्या पर्यटकांना एक विनम्र सूचना, रामघळीच्या या पवित्र वातावरणास इजा पोहोचेल असे कोणतेही कृत्य करू नये. हे पिकनिक अथवा मौजमजा करण्याचे ठिकाण अजिबात नाही. हा परिसर स्वच्छ व शांत ठेवण्यास मदत करावी. 

हेळवाक धनगरवाड्याची रामघळ :-

कोयनानगर हे महाराष्ट्राची वरदायिनी कोयनामाईवर बांधलेल्या नहाकाय धरणामुळे आणि तिथे असलेल्या जलविद्युत प्रकल्पामुळे प्रकाशझोतात आले. अलिकडे सह्याद्रीच्या निसर्गरम्य परिसरामुळे हे पर्यटनस्थळ म्हणून विकसित होत आहे.दुर्गभटक्यांसाठी जंगली जयगड, भैरवगड यासाठी हे गाव महत्वाचे .कोयनेच्या घनदाट जंगलात लपलेल्या भैरवगडावर जायचे तर एक मार्ग म्हणजे हेळवाक गाठून तिथून चालत कोंढवळ धनगरवाडा गाठायचा.पुढची वाटचाल निर्मनुष्य जंगलातून असल्यामुळे इथेव वाटाड्या घ्यायचा आणि भैरवगडाच्या दिशेन निघाल्यावर सर्वप्रथम दिसते समर्थांच्या वास्तव्यामुळे पुनित झालेली रामघळ.धनगरवाड्यापासून रामघळ अवघी दहा-पंधरा मिनीटाच्या अंतरावर आहे.
एका धबधब्याखाली खोल कपार तयार झालेली आहे. समर्थ रामदास या रम्य ठिकाणी शके १५९६ च्या आषाढात राहिले होते. रामघळ राम ओढ्याच्या वहाळात पुर्वेस तोंड करुन खोदली आहे. समोर दिसणारी अर्धगोलाकार दरी म्हणजे निसर्गनिर्मीत कलोसियमच जणु. स्वच्छ हवेत इथे आल्यास अगदी समोर पाटण जवळचा मोरगिरी किल्ला दिसतो.
आत पाच वेगवेगळी दालने असल्याचे स्पष्ट जाणवते. मधोमध असलेल्या दालनाची व्यवस्था देवघरासारखी भासते. इथे एक शिव पिंडी देखील आहे. घळीच्या माथ्यावर काताळ खडक आहे आणि पाण्याचा धबधबा घळी वरून कोसळत असतो अगदी, शिवथर घळी  प्रमाणेच. इथे रात्री मुक्काम करता येऊ शकतो पण पाणवठा असल्याने वन्य श्वापदांचा वावर खूप आहे.या रामघळीतूनच एक पाण्याच्या पाइपने धनगरवाड्याला पाणी पुरवठा केला आहे. 
हा धबधबा जरी बारमाही असला तरी, पाउस संपता संपता इथे येणे चांगले. या परिसरात जळवांचा त्रास मोठ्या प्रमाणात होतो.
रामघळीत उभारल्यास आपण धबधब्याच्या मागे उभे असल्याने पाण्याची पातळ चादर समोर पडते आहे असे वाटते. अर्थात हेळवाक, कोंढावळ धनगरवाडा हा विलक्षण कच्चा रस्ता असल्याने पावसाळ्यात धबधबा एन भरात असताना येथे येणे सोयीचे नाही.

 राजेमहाडीक वाडा, तारळे

      महाराष्ट्र ! म्हणजे असे राष्ट्र की, विश्ववंदनीय छ. शिवाजी महाराज याच भूमीतील सह्याद्रीच्या कुशीत जन्माला आले. शिवजन्मापूर्वीचा महाराष्ट्र परकीय आक्रमकांच्या अमलाखाली होता. येथील रयत आक्रमकांच्या जुलमाने त्रासली होती, पण तिचे रक्षण करणारा कोणीही त्राता नव्हता. आया बहिणींची भरदिवसा ढवळ्या अब्रू लुटली जात होती तर देव व मंदिरे उद्ध्वस्त करून धर्म बुडवून टाकण्याचा प्रयत्न जाणीवपूर्वक हिंदूद्वेष्ठ्या आक्रमक सत्तेकडून होत होता. येथे अनेक कर्तृत्ववान, महापराक्रमी योद्धे होते पण ते आक्रमक सत्तेच्या पदरी नामजाद सरदार म्हणून नोकरीस होते. पराक्रम करायचा तो आपल्या बादशाहाच्या तिजोरीत जास्तीतजास्त नकद व मुलूख पडावा म्हणूनच. अशावेळी वेरुळच्या भोसले घराण्याचा एक धोरणी, पराक्रमी शूर योद्धा शाहजीराजे हे विजापूच्या अदिलशाहा बादशाहाच्या वतीने कर्नाटकातील बंगळूर येथे कारभार पाहत होते. त्यांना महाराष्ट्रातील स्वकियांची काळजी वाटत होती. स्वराज्य संकल्पक शाहजी राजांनी एकदा मराठी रयतेसाठी स्वतंत्र राज्य निर्माण करण्याचा अयशस्वी प्रयोग केला होता. अशावेळी त्यांनी आपल्या पुण्याच्या जाहगिरीवर छ. शिवाजी महाराजांना मासाहेब जिजाऊ सह मोकासदार म्हणून पाठविले. जे आदिलशाहाच्या सेवेत राहून त्यांना करता येणार नाही ते मुलाकडून व्हावे हीच अपेक्षा व तशी खात्री देखील होती.
   छ. शिवाजी महाराजांनी बारा मावळातील अनेक सामान्य माणसांना स्वराज्य स्थापनेच्या कामात सहभागी करून घेतले. छत्रपतींच्या नेतृत्वाखाली सामान्य मावळ्यांनी असामान्य पराक्रम केला. अनेक घराणी परकीय आक्रमकांच्या सेवेतून स्वराज्याच्या कार्यात सहभागी करून घेण्यात छत्रपति यशस्वी झाले. अनेकांनी शौर्य, पराक्रम करून आपली स्वराज्यनिष्ठा सिद्ध केली. तिकडे कर्नाटक मधे शाहजीराजांसोबत अनेक इमानी मराठा सरदार आपले योगदान देत होती. त्यातील एक घराणे म्हणजे राजेमहाडिक यांचे होय. या घराण्याचा उल्लेख कविंद्र परमानंद नेवासकर यांच्या ' शिवभारत ' मधे येतो तो असा,
        " महाडिक परशुराम दुजे सत्याकुली नव || "
           महामानी महाडिके फत्ते खानास गांठू दे ||"
      हे घराणे मूळचे कोकणातील होय. त्यांच्या पूर्वजांकडे महाड बंदराचे वतन व देशमुखी तसेच, खेड बंदराची मोकादमी मिळाल्यामुळे त्यांना ' महाडिक ' हे उपनाम मिळाले. त्यांचा महापुरूष कृष्णाजीराजे १६१४ ला युसूफ आदिलशाच्या लुटालूटीत मरण पावले त्यांच्याकडे दाभोळची मुकादमकी होती.नंतर शिवाजी महाराजांची स्वराज्य निर्माण करण्याची सुरूवात झाल्यावर कृष्णाजींचे बंधू कानोजी यांना मिळाले हे ही १६५० ला युध्दात मरण पावले.त्यांचा मुलगा परसोजी हे शहाजीराज्यांस कर्नाटकात मदत करीत होते. परसोजीराजें कर्तृत्व व निष्ठा शाहजीशी एकरुप झाली होती. कानोजीराजे महाडिकांचे शौर्य, मुत्सदीपणा परसोजींच्या रक्तात पित्याप्रमाणे होता. परसोजींच्या मृत्यूनंतर हरजीराजे हे शाहजीच्या सेवेत दाखल झाले. शहाजीराजेंनी हरजीराजेंवर चांगलेच लक्ष होते .विजापूरकरानी हरजीराजे यांना (राजे,प्रतापराव, रायातराव) या पदव्या दिल्या होत्या
 शाहजीराजांच्या मृत्यूनंतर हरजीराजे छ. शिवाजी महाराजांच्या मोहिमेत यशस्वी होऊ लागले. छत्रपतींना हरजीराजेंची गुणवत्ता ज्ञात होती. हरजी राजेमहाडीक यांच्या कर्नाटकातील कामगीरीवर खुश होऊन सोन्याची जेजूरी गडावर हरजींना राजेशाही हा किताब सन्मानार्थ देऊ केला.त्यांच्या शूरवीरतेच्या गुणांमुळेच छञपती शिवाजी महाराज यांनी आपली मुलगी अंबिकाराणी यांचा हात विश्वासाने १६६८ ला श्रीमंत सरदार हरजीराजेंच्या हाती दिला व विवाह संपन्न झाला. शाहजी राजांच्या मृत्यूनंतर कर्नाटकातील मराठा सरदारांपैकी निष्ठावान व्यक्तीमधे हरजीराजे हे अग्रभागी होते. कर्नाटकची संपूर्ण जबाबदारी हरजीराजेंच्या नेतृत्वाखाली छ. शिवाजी महाराजांनी सोपविली. हरजीराजेंनी आपल्या पराक्रमाने कर्नाटकातील मुलूख वाढविण्यासाठी फार मोठा पराक्रम करून ते यशस्वी झाले.
   छ. शिवाजी महाराजांच्या निधनानंतर स्वराज्याचे दुसरे छत्रपति संभाजी महाराज गादीवर आले. छ. संभाजी महाराजांच्या आज्ञेवरून हरजीराजे, शामजी नाईक पुंडे, जैताजी काटकर, दादाजी काकडे हे सैन्यासह कर्नाटकात १६८१ गेले. स्वतः कर्नाटकात लक्ष घालावयास छ. संभाजी राजांना वेळ नसल्यामुळे त्यांनी हरजींना कर्नाटकाचे सर्वाधिकार आणि कर्नाटकातील सर्व गडकोटांचा अधिकार सोपविला होता. म्हैसूरचा सेनापति कुमारय्या याचा हरजींनी पराभव करून मदुरैच्या नायकाचा भरासाच भाग स्वराज्यात दाखल केला. पुढे मराठी सैन्याने त्रिचनापल्ली जिंकून घेतल्याने हरजींची सत्ता पूर्व कर्नाटकात इतकी वाढली की ते सर्वसत्ताधिश झाले. जिंजी, अर्काट  आणि भोवतालचा प्रदेश मराठ्यांचा ताब्यात होता.इ.स.१६८१मध्ये हरजीराजे राजेमहाडीक कर्नातकातचे-जिंजीचे मुख्य कारभारी झाले.त्यावेळी त्यांनी जिंजी राखला म्हणुनच जिंजी नंतर उपयोगि आला मार्टिनच्या दैनंदिनीत म्हतले आहे की हरजीराजे यांना जिंजीचे प्रशासक नेमण्यामागे संभाजीराजांची दुरदुष्टी होती. एक उत्कृष्ट सेनापति म्हणून हरजीराजांचा गौरव भारतातील इतिहासात नोंदविला गेला.जिंजीचे राज्य त्यांनी औरंगजेबाचे आक्रमणापासून वाचवले .म्हैसूर आणि तमिळनाडूचंया उत्तर अर्काटपर्यंत मराठ्यांनी औरंगजबाशी निकराचा सामना दिला . हरजी राजे गोवळकोंड्याकडील प्रदेश स्वराज्यास जोडण्याचा प्रयत्न करीत होते. इ.स.१६८८ च्या जानेवारी मध्ये ५००सैनिकांचे मदतीने कांचीवर गेले.व नंतर मार्च अखेरीस राजे त्रिचनापल्लि ते कांजीवरम या आघाडीवर गेले .त्यांची मुले प्रतापजी ,दुर्गोजी ,शंकराजी,जयसिंग ,सुभानजी,गुणाजी उदितसिंग,
   मुघलांनी छ. संभाजी राजांना पकडल्याची बातमी ऐकताच ९ - ३ - १६८९ रोजी केशव त्रिमल यांस त्रिणामली येथे हरजींने कैद केले. हरजीराजे व केशव त्रिमल यांच्यामधे कर्नाटकातील प्रमुखपदासाठी संघर्ष असला तरी दोघेही छ. संभाजी महाराजांशी अतिशय प्रामाणिक होते. हरजींनी कर्नाटकचा मुलूख चांगला संभाळला व त्यात वाढ देखील केली.छ. संभाजी राजांच्या दुर्दैवी मृत्यूनंतर राजाराम महाराज गादीवर आले. मोगल महाराष्ट्रात जोर धरु लागल्यावर राजाराम महाराजांना जिंजी जावे लागले. मोगल सरदार झुल्फिकारखान याने जिंजी वेढा दिला होता. यावेळी झालेल्या युद्धात एक तोफेचा गोळा लागल्यामुळे २९ सप्टेंबर १६८९ रोजी वयाच्या एक्केचाळीसव्या वर्षी हरजीराजेंचा स्वराज्य रक्षण करताना मृत्यू झाला. स्वराज्याच्या तीन छत्रपतींची अत्यंत निष्ठापूर्वक सेवा हरजीच्या हातून झाली.
   औरंगजेबाचा १७०७ मध्ये अहमदनगर जवळील भिंगार येथे मृत्यू झाल्यानंतर छ. संभाजी पुत्र शिवाजी उर्फ शाहू यांना काही अटीवर मोगलांनी मुक्त केले. छ. शाहू महाराजांनी सातारा येथे आपली राजधानी निर्माण  केली. छ.संभाजी महाराजांची कन्या भवानीराणी म्हणजेच छ. शाहू महाराजांच्या भगिणी यांचा विवाह हरजीराजे महाडिकांचे पुत्र शंकराजी यांचाशी झाला.भवानीबाई संभाजीराजे भोसले यांचा जन्म चार सप्टेंबर इ. स. १६७८ रोजी पिलाजी राजेशिर्के यांच्या ‘शृंगारपूर’ येथील वाड्यात झाला. येसूबाई राणीसाहेब माँसाहेब झाल्या! छत्रपती संभाजीराजे आबासाहेब झाले! राजकुळातील लाभाचे नातमुख जन्मास आले. भवानीबाई म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज व महाराणी सईबाई राणीसाहेब यांची नात व छत्रपती संभाजीराजे व येसूबाई राणीसाहेब यांची ज्येष्ठ कन्या. छत्रपती संभाजीराजांच्या मृत्यूनंतर भवानीबाई या आपल्या मातोश्री येसूबाई राणीसाहेब व धाकटे बंधू शाहूमहाराज यांच्याबरोबर औरंगजेबाच्या कैदेत होत्या. त्यांचे लग्न शंकराजी महाडिक यांच्याशी, म्हणजेच आपल्या आत्या अंबिकाबाई यांच्या मुलाशी झाले होते. अंबिकाबाई म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज व सईबाई राणीसाहेब यांच्या सर्वांत धाकट्या कन्या. साऱ्या दक्षिण प्रांतात मोगली फौजा धुमाकूळ घालत होत्या. अशा वेळी हरजी महाडिक व शंकराजी महाडिक यांनी जिंजी परिसर स्वराज्यात ठेवण्याचा फार मोठा पराक्रम केला. त्यामुळे छत्रपती शाहूमहाराजांनी शंकराजी महाडिक म्हणजेच आपले थोरले मेव्हणे यांना चार हजारी मनसबदार करून आपल्या ज्येष्ठ भगिनी भवानीबाई यांना चोवीस गावांची सनद दिली. तसेच ७२ वाड्यांची व पाचही वतनाची सनद त्यांच्या नावे करून दिली.शाहू महाराजांचे आपल्या मोठ्या भगिनी भवानीबाई यांच्यावर अतिशय प्रेम होते. भवानीबाई या अत्यंत हुशार व धाडशी होत्या.
     १७०९ साली छ. शाहूंनी तारळे ता. पाटण जि. सातारा विभागातील २४ गावची जहागिरी त्यांना दिली. त्याच्या आधी मोगलांनी तारळे महालाची वाताहात केली होती. अशा वेळी हनगोजी काटे- देशमुख, सिदोजी, विठोजी साळवे-देशमुख, देशपांडे, मुकादम, कुलकर्णी, शेटे, महाजन व बलुतेदार मंडळींनी रयतेला संरक्षण देण्याबरोबरच महालाला ऊर्जितावस्था आणण्याचे भवानीबाईंना साकडे घातले. त्यानुसार भवानीबाई व शंकराजीराजेंनी तारळे महालावर आपला अंमल प्रस्थापित करून विस्कटलेली घडी बसविली.शंकराजीराजे महाडिक यांनी स्वराज्याची सेवा करीत असताना १७२८ मध्ये देह ठेवला. त्यावेळी तारळे गावच्या तारळी व काळगंगा नद्यांच्या संगमावर भवानीराणी सती गेल्या. भवानीराणी व शंकराजी यांना दुर्गोजी व अंबाजी असे दोन पुत्र होते. दुर्गोजी हे कोल्हापूर येथील स्वराज्याच्या दुसऱ्या गादीच्या संभाजींच्या चाकरीत होते तर, धाकटे अंबाजी हे सातारा छत्रपति यांच्या सेवेत होते. याच घराण्यातील भवानजी हे छत्रपति प्रतापसिंहांच्या काळात सातारा गादीच्या सेवेत होते.     
   सातारा जिल्ह्यातील पाटण तालुक्यातील ऐतिहासिक तारळे (ता.पाटण जि. सातारा ) गावात राजेमहाडिकांचे सुमारे तीन एकर क्षेत्रफळावर एकूण आठ वाडे होते, त्यापैकी चार वाडे काळाच्या ओघात नष्ट झाले असून चार वाडे अजूनही उन, वारा, पाऊस यांचा सामना करीत आपल्या पूर्वजांचा वैभवशाली पराक्रम मूकपणे सांगताना दिसतात. त्यातील ३-४ वाड्यात त्यांचे वंशज राहतात. एका वाड्यात शाळा आणि वसतीगृह आहे. वाड्याजवळ असलेले राममंदिर, बारव  पण वैशिष्ट्यपूर्ण आहे. वाड्यामधे आड,तलवार, दांडपट्टे, ढाल, भाले, पालखी अशा विविध गोष्टी पहायला मिळतात.गावाच्या बाहेर नदी संगमावर शंभूराजेंची मुलगी भवानीबाई महाडिक यांची समाधी आहे
      तारळे गावाच्या नावाला प्राचीन इतिहास आहे. तारकासुर राक्षसाच्या संकटातून तारले म्हणून तारळे हे नाव मिळाले असावे. या गावामुळे आजूबाजूच्या इतर खेडेगावांचे मिळून तारळे खोरे हे संबोधन प्राप्त झाले आहे. परिसरातील कडवे येथे पांडव लेणी व रामघळ आहे, खवाळवाडीच्या डोंगरावर विंध्यवासिनीदेवीचे मंदिर आहे. तारळे गावाच्या पूर्वेला असलेल्या पाल येथे भक्तांचे दुःख हरण करणारा खंडोबा देवस्थान, दक्षिणेस चाफळ गावी प्रभू श्रीराम मंदिर तर उत्तरेस समर्थ रामदासस्वामींचे समाधीस्थळ सज्जनगड आहे. या आठ वाड्यांचे प्रवेशद्वार वेगवेगळ्या दिशेला असून मात्र या सर्व वाड्यांचे परसदार एकाच चौकात होते. प्रत्येक वाड्याचे प्रवेशद्वार आपल्या भव्यतेची जाणीव करून देते. वाड्यात भरपूर ऐतिहासिक सामुग्री आजही पाहण्यास मिळते. यात प्रामुख्याने तत्कालीन शस्त्र, महिलांसाठी असलेले लाकडी मेणे, व्यायामाचे साहित्य, कासवाच्या पाठीच्या ढाली, संदूक, इत्यादी राजेमहाडिकांच्या वंशजांनी फार कष्टाने सुरक्षित ठेवले आहे. काळ बदलला असला तरी आपला गौरवशाली इतिहास सांभाळणा-या श्री.विजयसिंह काकासाहेब राजेमहाडिक, धैर्यशिल राजेमहाडिक व इतर वंशजांनी खूप मेहनत घेतल्याचे प्रामुख्याने दिसून येते. भवानीराणीच्या समाधीचे सध्या नुतनीकरण सुरू झाले असून लवकरच तारळे या गावी एक भव्यदिव्य समाधी आपल्याला दिसून येईल.
   हरजीराजे महाडिकांचे स्वराज्यासाठी दिलेले योगदान फार मोलाचे असून त्यांच्या वारसदारांचे छ. शाहू राजांच्या काळातील योगदान तितकेच मोलाचे आहे त्याचा गौरवशाली वारसा तारळे येथे दिसून येतो. हेच महाराष्ट्राचे वैभव आहे. ज्या राजेमहाडिकांशी छत्रपति घराण्याने दोन वेळा आपल्या मुलींचा विवाह केला ते त्या गुणवत्तेचे असल्याचे इतिहासाने पाहिले आहे. धन्य हरजीराजे, ज्यांनी सलग स्वराज्याच्या तीन छत्रपतींच्या सेवेत राहून आपल्या असामान्य कर्तृत्वाने स्नेह, प्रेम व विश्वास मिळविला.

जरंडेश्वर मारुती देवस्थान

          प्रत्येक देवाचे महात्म्य वेगळे, वैशिष्ठ्य वेगळे, असाच महादेवाच्या मुख्य डोंगरारांगेपासून थोडा वेगळा झलेला साताऱ्याच्या सात ताऱ्यांपैकी एक तारा "श्रीक्षेत्र जरंडेश्वर" साताऱ्यापासून पूर्वेला सुमारे १६ किमी अंतरावर असून, स्थानिक लोक याला जरंडा म्हणून ओळखतात. डोंगराच्या माथ्यावर मधोमध वसले आहेत मारुतीराय आपल्या एका वैशिष्ठ्यासह, मूर्तीच्या उग्र चेहऱ्यावर मिशी आहे. पश्चिमाभिमुख गाभार्यात सुमारे चार फुट उंचीची मूर्ती आहे. येथील मारुतीची स्थापना समर्थांनी केली असून, मारुतीचे मंदिर, मंडप, धर्मशाळा, गोविंदबाबा सिधये नावाच्या हनुमानभक्ताने बांधली आहेत. गोविंदबाबांना हनुमानाचा साक्षात्कार झाला होता, असे सांगितले जाते.
आल्हाददायक हवा आणि दमछाक करणारी चढण यामुळे भक्ती आणि शक्तिचे प्रतिक असलेले हे देवस्थान हेल्थकॉन्शिअस लोकांसाठी पर्वणीच आहे. सातारा शहर आणि आजू बाजूचे बरेच नागरिक व भक्त दर शानिवारी येथे येतात. गेल्या काही वर्षांपासून पासून डोंगर चढण्याची स्पर्धा येथे आयोजित येते.
      अशी अखायिक सांगितली जाते कि संजीवनी आणण्यासाठी हिमालयात गेलेले रामभक्त हनुमान संपूर्ण द्रोणागिरी पर्वताच घेवून परत आले आणि त्या पर्वतातील एक खडा जमिनीवर पडला तोच हा जरंडेश्वर पर्वत. जाणकार लोक असेही म्हणतात कि या डोंगरावर बऱ्याच औषधी वनास्पती मिळतात. निसर्गाची मुक्त हस्त उधळण, प्रसन्न वातावरण, मंदिर, मठ आणि आजूबाजूच्या परिसराची ठेवण्यात आलेली स्वच्छता, यामुळे मंदिरातील होणाऱ्या विधिवत पूजा अर्चा, हनुमान जयंतीचा सोहळा, रामनवमी, श्रावणी शनिवार, जरंडेश्वर डोंगर प्रदक्षिणा, पालखी सोहळा आणि इतर समारंभाला हजारो लोक दरवर्षी येथे गर्दी करतात.
डोंगरावर जाण्यासाठी दोन मुख्य वाट आहेत व त्यांना मिळालेल्या इतर वाटा देखील आहेत. पहिली वाट सातारारोड-पडळी या गावातून येते हि वाट सरळ चढन आणि खूप दमछाक करणारी आहे या वाटेनी वर यायला सुमारे ४० मिनिट लागतात. प्रशासनामर्फत येथे नुकत्याच पायऱ्या बांधण्याची खडतर मोहीम पाडली आहे. दुसरी वाट जांब या गावातून वर येते हि सोप्पी वाट २० मिनिटात माथ्यावर पोहोचवते.
पडळी गावातून येणारी वाट:
        हनुमानाचा अंगठा: थोडे चढून गेल्यानंतर हनुमानाचा अंगठा म्हणून एक ठिकाण लागते येथे हनुमानाचा अंगठ्याला ठेच लागली असे सांगितलं जातं.
तळे: डोंगराच्या मध्याच्या थोडेसे वर पाण्याच्या प्रवाहाला दगडी बांध घातलेला दिसतो. डोंगराच्या ओघळातला खडक आणि सुमारे २० फुट उंच दगडी बांध यात पावसाळी पाणी साठवले जाते. या तळ्यात दोन्ही बाजूनी उतरण्यासाठी पायऱ्या आहेत. सध्या मठातील वस्ती आणि भाविकांसाठी याच तळ्याच्या सुमधुर पाण्याचा वापर केला जतो.

  मधू-मकरंद गड  

पर्यटकांमधे प्रचंड लोकप्रिय असलेल्या महाबळेश्वरला प्रत्येक पाँईटवर दिवसभर हि गर्दी असते, मात्र संध्याकाळ होईल तशी या गर्दीची पावले वळतात, "मुंबई पॉंईट" किंवा आधीचा "बॉम्बे पॉईंट" कडे, अर्थातच सुर्यास्ताचा आनंद घेण्यासाठी. महाबळेश्वरच्या पश्चिम टोकावर असलेल्या या पॉईंटवर उभारल्यास उजव्या हाताला शिवभारताची साक्ष देणारा प्रतापगड खुणावत असतो. मात्र बहुतेक वेळा सुर्य बुडतो, तो एका खोगीराच्या आकाराच्या डोंगरामागे. सुर्यास्ताचे फोटो तर काढले जातात, पण हा सुर्यास्त ज्या डोंगराच्या मागे होतो आहे तो एक प्राचीन गड आहे, हे कोणाच्या गावीही नसते. या गडाचे नाव मोठे गोड आहे, "मधु-मकरंदगड". ईंग्रजांनी त्याचा खोगीरासारखा आकार ध्यानी घेउन त्याला "सॅडलबॅक" असे यथार्थ नावही दिले आहे.
       सह्याद्रीची सरासरी उंची २००० ते ३५०० फुट आहे. काही ठिकाणी ती चार हजार आणि तीन ठिकाणी ( कळसुबाई, साल्हेर, घनचक्कर ) पाच हजाराच्या वर जाते. महाबळेश्वरच्या दक्षिणेला मात्र सह्याद्रीची सरासरी उंची फार तर ३५०० फुटापर्यंत पोहचते. सह्याद्रीतील बहुतेक उंच शिखरे त्याच्या पुर्वेला पसरलेल्या डोंगररांगात आहेत. मात्र सह्याद्रीच्या मुख्यरांगेत रतनगड, आजोबा,भागरीया, ढाकोबा आणि मधुमकरंदगड हि पाचच शिखरे चार हजार फुटापेक्षा उंच आहेत. जवळपास ४०६४ फुट उंची, ताशीव कडे असणारी दोन शिखरे आणि अभेद्य कवच्यासारखे आजुबाजुला पसरलेले जंगलाचे नैसर्गिक संरक्षण यामुळे या अचुक जागा पकडलेल्या या डोंगरावर दुर्ग उभारणी न झाल्यास नवल होते. हा गड नेमका कोणी उभारला ते अज्ञात असले तरी, गडावर असलेल्या खांब टाक्यावरुन गड प्राचीन नक्कीच आहे, बहुधा पन्हाळ्याचा दुसरा भोज याच्या हातचे स्थापत्य असावे. नंतरच्या ईतिहासाचे विशेष उल्लेख नसले तरी, बहुधा शिर्के आणि नंतर जावळीच्या मोर्‍यांच्या ताब्यात हा प्रदेश होता. ई.स. १६५६ मधे ( जानेवारी ते मे ) जावळी ताब्यात घेतल्यानंतर हा गड शिवाजी महाराजांच्या ताब्यात आला. सातारा जिल्हा गॅझेटिअरप्रमाणे हा गड शिवाजी महाराजांनी बांधला असा उल्लेख येतो ,परंतु सभासदाच्या बखरीत अशी नोंद सापडते, "हणमंतराव म्हणून चंदररायाचा भाउ चतुर्बेट म्हणून जागा जावलीचा होता, तेथे बल धरुन राहिला. त्यासही मारले". बहुधा आदिलशाहीत इतर गडाप्रमाणे या गडाकडेही दुर्लक्ष झाले असणार आणि ते बेवसाउ बनले असतील. शिवाजी महाराजांनी ते बांधून काढले असती किंवा दुरुस्ती केली असेल. एकूणच प्रतापगड ते वासोट्या या गडादरम्यानचा हा दुवा.  मकरंदगड मे १८१८ मधे ईंग्रजांनी घेईपर्यंत स्वराज्यात होता, इतके याचे महत्वाचे स्थान होते.
      या गडावर जायचे तर तीन पर्याय आहेत.
१) चतुरबेटमार्गे:-
   महाबळेश्वरवरुन कोयनेच्या खोर्‍यात दुधगाव या ठिकाणी थेट बस आहे. हि बस वाडा-कुंभरोशी पार फाटा- शिरपोली मार्गे दुधगावला पोहचते. दुधगाववरुन कोयना नदी ओलांडून चतुरबेट या गावी जायचे किंवा स्वताची गाडी असेल तर थेट चतुरबेटला जाता येते. गावातूनच एक पायवाट थेट गडावर जाते. जीपसारखे कच्चा रस्त्यावरुन जाणारे वहान किंवा बाईक असेल तर थेट मकरंदगडाच्या खांद्यावर वसलेल्या घोणसपुर या गावापर्यंत मातीचा कच्चा रस्ता झालेला आहे, त्याने थेट जाउन बरीच पायपीट टाळता येते.यासाठी चतुरबेटवरुन एक रस्ता दाभे-मोहन या गावी जातो, त्या रस्त्यावरच घोणसपुरकडे जाणारा कच्च्या रस्त्याचा फाटा उजव्या हाताला आहे.
२ ) हातलोट मार्गे:-
गडावर जाणारा मुळ मार्ग हातलोट गावातून होता.
या गावात उभारल्यास गडाची मधु आणि मकरंद हि दोन्ही शिखरे दिसतात आणि त्याचा खोगीरासारखा आकारही स्पष्ट जाणवतो.
हातलोट गावाच्या पहिल्या वाडीत मारुती मंदिर आहे. ईच्छा असल्यास इथे मुक्काम करता येईल.मंदिराच्या समोरच लोखंडी पुल आहे. तो पार करुन सव्वा तासाच्या खड्या चढाने गडाच्या डाव्या कड्यापाशी पोहचतो. तिथे उजवीकडे वळाल्यानंतर वीस मिनीटात मल्लिकार्जुनाच्या मंदिरात पोहचतो. तिथून वीस-पंचवीस मिनीटात गडावर.
३ ) बॅबिंग्टन पॉईंटमार्गे:-
  हा तिसरा मार्ग म्हणजे "चरती चरतो भगः"वर विश्वास ठेवणार्‍यांसाठी, अर्थातच पदभ्रमंतीची हौस भागवणार्‍यांसाठी. यासाठी, महाबळेश्वरवरुन तापोळ्याला जाणारी बस पकडायची आणि बॅबिंग्टन पॉईंटला उतरायचे. महाबळेश्वरची बाजारपेठ ते बॅबिंग्टन पॉईंट हे २ ते २.५ कि.मी. आहे. इथून मागे सोळशी नदीचे खोरे आणि समोर पश्चिमेला कोयना नदीचे खोरे दिसते. या ठिकाणी दोन पर्याय आहेत. इथून रॉबर्टस केव्ह म्हणजे चोरांच्या गुहेशेजारून मालुसरे गावी जावे. तिथल्या गवळणी पॉईंटवरुन खाली उतरले कि झोलाई खिंडीतून खाली एक रस्ता थेट चतुरबेट गावाकडे जातो , पण जर हि वाट सापडली नाही तर मस्त मळलेल्या वाटेने उतरुन झांजवाडी, दुधगावमार्गे चतुरबेट गाठायचे आणि तिथून मकरंदगडावर चढाई करायची. ह्या मार्गे जवळपास तीन-साडे तीन तास लागतात.
    महाबळेश्वर भटकताना आणि सुर्यास्ताच्या वेळी हा मधुमकरंदगड पाहिला होता, मात्र एखादा ग्रुप असल्याशिवाय त्यावर जाणे योग्य नाही, कारण या जंगलात अस्वले मोठ्या प्रमाणात आहेत याची माहिती होती. एके दिवशी पुण्याच्या 'गिरीदर्शन ट्रेकिंग क्ल्बचा' मेसेज आला. त्यांनी एक दिवसाचा मधुमकरंदगडाचा ट्रेक आयोजित केला होता. वाईमधे मिनीबसमधे बसून मस्त पैकी झोप काढली.
   महाबळेश्वरकडून प्रतापगडाच्या पायथ्याशी असणार्‍या वाडा-कुंभरोशी गावाच्या अलिकडे पार-चतुरबेट-हातलोट या गावाला जाणारा फाटा फुटतो. रात्री हा फाटा कदाचित लक्षात येत नाही, त्यासाठी या फाट्यावर "वरदायिनी माता" असे लिहीलेली सिमेंटची मोठी कमान आहे हि खुण लक्षात ठेवायची. आम्ही कुंभरोशीला चहा घेउन या मार्गे चतुरबेटला निघालो. वाटेत बस रस्ता चुकल्याने थोडा वेळ मोडला. त्यावेळी थोडा वेळ खाली उतरलो. मे महिन्याचे दिवस होते, काही झाडे काजव्यांनी अक्षरशः फुलून गेली होती. निसर्गाची हि रोषणाई आम्ही स्तब्ध होउन पहात होतो. तो क्षण न विसरण्याजोगा. रात्री तीन साडे तीनला चतुरबेट या गावी पोहचलो. एखाद्या महासागरातील बेटाचे असावे असे या गावाचे नाव, मात्र जवळ समुद्र सोडा, नदीही लांब आहे. या गावातल्या मल्लिकार्जुन मंदिरात उरलेली झोप पुर्ण केली. पहाटे घंटा नादाने उठलो. आवराआवर नाष्टा करुन एका वर्तुळात उभे राहिलो. ओळख परेड संपली आणि गडाकडे कुच केले. गंमत म्हणजे, चतुरबेट हे पायथ्याचे गाव असले तरी इथून मात्र मकरंदगड दिसत नाही.
घनदाट जंगलातून थोडावेळ चढल्यानंतर थोडक्या सपाटीनंतर वाट एका ओढ्यात उतरते. साधारण अर्ध्या तासात आपण ईथे पोहचतो.ओढा ओलांडून मात्र मस्त मळळेली वाट घनदाट झाडीतून चढायला सुरवात करते, ती जवळपास पाउण-एक तासानंतर उघड्यावर येते.
इथेच आपल्याला गड माथ्याचे म्हणजेच मकरंदगडाचे दर्शन घडते. आता थोडीच चढण बाकी असते. इथे थोडी लिंबु पाणी, सरबत, चिक्की अशा इंधनाची देवाण घेवाण झाली.
थोड्या वेळात आपल्याला मातीची कच्ची सडक आडवी जाते. वाटल्यास या सडकेवरुन पुढची वाटचाल करायची किंवा पाउलवाट शॉर्ट्कटने वर चढते, त्याने पटापट चढून सपाटीवर पोहचायचे. डाव्या हाताला वीजेच्या तारा आणि खांब सोबत करतात आणि समोर दिसते,
गडाच्या खांद्यावर वसलेले, बहुतेक जंगम लोकांच्या वस्तीचे "घोणसपुर". गडावर जेव्हा राबता होती तेव्हा हे मेट होते, इथे परवानगी घेतल्याशिवाय पुढे जाणे शक्य नाही. आपल्याजवळ शिधा असल्यास इथे दिला तर जेवण तयार करुन मिळते.
ग्रुप लिडर पुरुषोत्तमने आधीच फोनवर एका घरात जेवणाचे सांगून ठेवले होते. त्यामुळे फार वाट न पहाताच चपात्या आणि कांदा बटाट्याचा रस्सा ताटात आला.
  बर्‍याच दिवसानंतर पडवीत सहभोजनाचा आनंद घेतला. आणि वामकुक्षीच्या मोहात न पडता गडाकडे निघालो.
प्रशस्त मातीच्या रस्त्याने थोडे अंतर चालल्यानंतर समोर मल्लिकार्जुन मंदिर दिसु लागले.
गडाच्या या परिसरात घनदाट जंगल असल्याने या वाटेवर नीट लक्ष दिले तर वन्यप्राण्यांचे ठसे दिसु शकतात. बिबट्याने आपण इथून गेलो याचा माग मागे सोडला आहे.
दाट वनराईत लपलेले हे मंदिर म्हणजे सह्याद्रीत मुक्काम करण्याजोग्या आदर्श जागातील एक. एन मे महिन्यात थंडीचा अनुभव घ्यायचा असेल तर इथे मुक्काम अगदी आवश्यकच आहे.
मंदिरात काही प्राचीन शिल्प आहेत.
एकुण मंदिराची बांधणी काहीशी अनगड आहे. देउळ निसंशय जुने आहे. शिवकालापुर्वी चंद्रराव मोर्‍यांनी ज्या सात शिवमंदिरांना ईनामे दिलेली होती, त्यातील हे एक. हि मंदिरे उभारणारे कलाकार नसतात, पण अत्यंत बिकट जागी भक्तिभावाने उभारलेली हि राउळे पाथंस्थाच्या वाटचालीत सुखागरे ठरतात.
   बरीच चाल झालेली होती. जेवणही हातापायत उतरले होते. मोठा ग्रुप असल्याने बरेच नवखे आणि शारीरीक क्षमता कमी असणारे गार्डाचे डबे होते. आम्ही देवळात पोहचलो तरी बहुधा हि पिछाडीची फळी अजून निघायची होती. साहजिकच वेळ होता म्हणून सभामंडपात अंग टाकले. जमीनीच्या थंडावा संपुर्ण शरीरार झिरपला आणि विलक्षण सुखाची अनुभूती झाली. पाचच मिनीटाची ती झोप ताजेतवाने करुन गेली.
मे महिना असल्याने जांभळे झाडाला लगडली होती. त्याचा आस्वाद घेत आणि बीया आजुबाजुला भिरकाउन देत पुढची वाटचाल सुरु झाली. मात्र थोड्यावेळात झाडांनी सोबत सोडली आणि वरुन कळकळते उन आणि खालून भट्टीप्रमाणे तापलेली जमीन यातून आमची वाटचाल सुरु झाली. त्यात खडी चढणारी वाट, परिणामी छातीचा भाता सुरु झाला. घामाच्या धारा टिपून एका वळणावर आलो, तो फार मोठा पॅनोरमा समोर आला. गडाची मधू आणि मकरंद हि दोन्ही शिखरे आणि त्यांना जोडणारी धार दिसु लागली.
पश्चिम क्षितीज्यावर महिपतगड, सुमारगड आणि रसाळगड हे दुर्ग त्रिकूट असलेली रांग  दिसू लागली. उंचीशी सह्याद्रीशी स्पर्धा करणारी कोकणातील एकमेव रांग. सह्याद्री आणि हि रांग यांच्यामधे जगबुडी नदीचा उगम होतो. यातील सुमार त्याच्या कातळटोपीमुळे आणि आडवातिडवा पसरलेला महिपतगड सहज ओळखू येतात. मात्र रसाळ बराच लांब असल्यामुळे बारकाईने पाहिल्यावर ध्यानी आला. अगदी तळात एक त्रिकोणी आकाराची टेकडी दिसत होती, याच्या पायथ्यातून कोंड नाळेसारखी अवघड वाट खाली उतरते.
एका बाजुला सपाटीवर वसलेले घोणसपुर आणि गावकर्‍यांची शेत दिसत होती.
वाटेत एक मुर्ती दिसली कशाची आहे ते समजले नाही.
यानंतर एका नैसर्गिक दगडाचा बुरुजासारखा उपयोग करुन मधून वाट कोरुन काढली आहे. इथे निश्चितच पहार्‍याची चौकी असणार.
यानंतर एक सपाटी येते. इथे आपण जवळपास माथ्यावर पोहचलो असतो. इथे एक वैशिष्ट्यपुर्ण खडक आहे. एखाद्या नेढ्यासारखा तो खालून पोकळ आहे.
बहुधा खडकाचा हा भाग पाण्याच्या लोटामुळे वाहून जाउन हि अशी रचना तयार झाली असावी.
         इथून पुढचा रस्ता आपल्याला थेट माथ्यावर नेतो. यापुर्वी हि वाट थोडी अवघड होती. मात्र पर्यटन विकासांतर्गत मकरंदगडावर काही विकासकामे झाली, त्यात घोणसपुरला येणारा कच्चा गाडी रस्ता, गडावर चढणार्‍या वाट रुंद आणि सोप्या करण्यात आल्या.
गडमाथा त्रिकोणी आकाराचा आहे. सुरवातीला एक गदडी स्तंभ दिसतो. बहुधा हि एक प्रकारची दिपमाळ असावी.
याच्या समोर प्राचीन दगडी बांधणीचे कौलारू मल्लिकार्जुन मंदिर दिसते. शंकर हा पर्बताचा निवासी आणि सह्याद्रीत हि अशी मोक्याची जागा पाहून बांधलेली असंख्य शिवमंदिरे दिसतील.
आतमधे काहीसा एकांतवास भोगणारा शंभु महादेव नागराजाच्या सोबत बसला आहे.
भर्राट वारा गडमाथ्यावर आपले स्वागत करतो. प्रचंड मोठा परिसर नजरेत मावत नाही. एका बाजुला पुर्वेकडे महाबळेश्वरचे पठार आणि सह्याद्रीची रांग दुभागणारी कोयनामाई धरणाच्या पाण्याचे शिवसागर रुपात सोबतीला असते.
तर शिवछत्रपतीच्या पराक्रमाच्या सोनेरी क्षणात हरवून गेलेला प्रतापगड झाडीतून आपला माथा उंचावतो. या खेरीज हवा स्वच्छ असेल तर लांब उत्तरेला कांगोरी उर्फ मंगळगड नजरेला पडू शकतो. पश्चिमेला रसाळ, सुमार आणि महिपत हे त्रिकुट तर दक्षिणेला महिमंडणगड, चकदेव खुणावतात.
     समोर गडाचे दुसरे "मधूगड" हे शिखर दिसते.
गडमाथ्यावर थोडी विश्रांती घेतली आणि उत्तर बाजुला असलेल्या दुसर्‍या वाटेने खाली उतरु लागलो.
उभ्या उताराची हि दिड दोनशे फुटाची वाट जपूनच उतरायची. इथे पाय घसरल्यास क्षमा नाही.
इथून खाली उतरलो कि आपण एका उभ्या कड्यात खोदलेल्या प्रचंड मोठ्या खांब टाक्यापाशी येतो. गडाच्या प्राचिनत्वावर शिक्कामोर्तब करणारी हि खुण.
खांब सोडून कोरलेले टाके याचा अर्थ इथे किमान सातव्या शतकापासून इथे मानवाचा वावर आहे हे निश्चित.
टाक्याच्या वरच्या बाजुला चक्क मारुतीचे शिल्प आहे. 'पुच्छ ते मुरडीले माथा', या आवेशात मारुतीराया आहेत. पाण्यावर पिवळ्या शैवालाचा तरंग असला तरी तो बाजुला करुन पाणी पिता येते. बाटलीत भरुन मी ते पाणी तोंडाला लावले. अक्षरशः एकाच वेळी पोटात आणि मेंदुत विलक्षण थंडावा देणार्‍या पाण्याची जादू अनुभवायची असेल तर एन उन्हाळ्यात सह्याद्रीची भटकंती करायला पाहिजे.
     बहुतेक जण इथून माघारी फिरतात. पण गडाचे दुसरे म्हणजे मधु हे शिखर पहायचे असेल तर, या टाक्याजवळून एक पायवाट पश्चिमेकडे जाते, या वाटेने चालल्यास एक खडक चढून आणि पुढची गवताळ घसार्‍याची आणि निसरड्या वाटेने आणि एका डोकावणार्‍या खडकावरुन आपण मधुगडाच्या माथ्यावर पोहचतो. अर्थात हि वाट अवघड आहे आणि फारसा मानवी वावर इथे नाही, हे लक्षात घेउन एकटे दुकटे ईकडे येउ नये. गडमाथ्यावर तीन कोरड्या टाकी आणि एकदोन पड्क्या घरांच्या जोत्याशिवाय काहीच नाही. गवतातून सावधपणे पश्चिम टोकावर गेल्यानंतर मात्र डोळ्याचे पारणे फेडणारा नजारा सामोरा येतो. थेट कोकणात कोसळेला मधुगडाचा कडा, त्याच्या उत्तर बाजुने उतरणारा हातलोट घाट हि सोपी वाट आणि एखाद्या नरसाळ्यासारखी रचना असणारी आणि खड्या उतारची आणि विलक्षण घसार्‍याची कोंडनाळ.
        मधुमकरंदगडाच्या दोन बाजुने दोन वाटा खाली कोकणात उतरतात. यापैकी उत्तरेच्या हातलोट गावातून हातलोट घाट उतरतो. घाट हा बहुधा बैलांच्या सोयीच्या रस्त्याने केलेला असतो, सहाजिकच हि वाट उतरायला सोपी असते. मी काही या घाटाने खाली उतरलेलो नाही, पण या देशीचे काही जिद्दी तरुणांनी ते धाडस केले आहे. त्यांच्या या साहसाला मानाचा मुजरा म्हणून त्यांच्या ब्लॉगच्या लिंक देतो.
रसाळगड – सुमारगड – महीपतगड – हातलोट घाट
कोंडनाळ-मकरंदगड- हातलोट घाट
     हातलोट घाट सोपा असला तरी एक अतिशय कठीण अशी नाळ मकरंदगडाच्या दक्षिण अंगाने कोकणात उतरते. हि नाळ म्हनजे कोंड नाळ. या मार्गे ज्यांना जायचे आहे त्यांच्यासाठी खालील लिंक उपयोगी पडेल.
कोंडनाळ - हातलोट घाट
टाक्यापसून परतीची वाट आपल्याला पुन्हा एकदा माचीवरच्या मल्लिकार्जुन मंदिरापाशी आणते. वाटेत हि कातळात कोरलेली गुहा दिसली, मात्र हिचा उद्देश समजला नाही.

शिवकालीन पुल, पार :-
      अवघ्या महाराष्ट्राचं दैवत असलेले छत्रपती शिवाजी महाराजांच्या पराक्रमाच्या गाथा आपण वाचल्या आहेत. महाराजांनी स्वराज्य स्थापना करताना काही सवंगड्यांना हाताशी घेतलं आणि स्वराज्य स्थापन केलं. शिवाजी महाराजांनी फक्त लढाया केल्या नाहीत तर त्यांना दूरदृष्टीसुद्धा होती. महाराजांनी साडेतीनशे वर्षापुर्वी सांगितलं होतं की महाराष्ट्रावर हल्ला झाला तर तो समुद्र मार्गाने होईल आणि ही दूरदृष्टी खरी ठरली. 26/11 चा दहशतवादी हल्ला झाला तेव्हा ते दहशतवादी समुद्र मार्गाने आले होते. त्यानंतर राज्य सरकारने समुद्र किनाऱ्यावरील सुरक्षा वाढवली होती.साताऱ्यातील एक पूल छत्रपती शिवरायाच्या इतिहासाची साक्ष तर देतोच, पण या नव्या युगातील इंजिनीअर्सनाही बोध देतो.
  मुसळधार पावसाच्या सरी कोसळणारं सातारा जिल्ह्यातलं जावळीचं खोरं. याच पर्वतरागांमध्ये शिवरायांचा प्रताप सांगणारा प्रतापगड. मुसळधार पावसामुळे इथे कोयनेच्या उगमस्थानाच्या नदीला कायम महापूर. त्यामुळे पावसाळ्यात प्रतापगडाच्या पायथ्याला येताना ही कोयना नदी ओसंडून वाहत असायची.
  या भागातून प्रवास करणं जिकीरीचं असल्यामुळे शिवाजी महाराजांनी या ठिकाणाची पाहणी करुन तत्कालीन पार्वतीपूर या गावात म्हणजे आताच्या पार या गावाजवळ पूल उभारला.  52 मीटर लांबीचा, 15 मीटर उंचीचा आणि आठ मीटर रुंदीचा हा पूल अवघ्या काही महिन्यांत उभारला गेला.
  या पुलाला पाच दगडी खांब आणि चार कमानी आहेत. या पुलामुळे छत्रपतींसह मावळ्यांचा प्रवास पावसातही सुकर झाला. इतिहासाची साक्ष देणाऱ्या या पुलाला ना कोणतं अत्याधुनिक तंत्रज्ञान ना कोणता इंजिनिअर लागला. असा आखीव रेखीव पूल की सध्याच्या टाय घातलेल्या इंजिनीयरांनाही विचार कारायला लावणारा.
  पुलाचा प्रत्येक दगड काटकोनात घडवलेला, तोही एकदम मापात. ज्या बाजूने पाणी या पुलाखाली जाते, त्या प्रत्येक खांबाला धारदार कुऱ्हाडीसारख्या दगडी भिंती. पुरातील पाण्यासोबत आलेलं कोणतंही लाकुड या पुलावर आदळलं तरी त्याचे दोन भाग व्हावेत अशी ही कल्पना. पुरामुळे कोणता ओंडका आदळला तरी पुलाला कोणताच धोका नाही.
  पाणी जाण्यासाठी बनवलेली कमानही मंदिराच्या गाभऱ्यासारखीच. कोरीव काम केलेल्या या पुलाला आज तब्बल साडेतीनशे वर्ष पूर्ण झाली, पण हा पूल आजही त्याच दिमाखात इतिहासाची साक्ष सांगत लोकांसाठी उभा आहे. शिवरायांच्या काळात बांधलेल्या या पुलाचा उपयोग नंतर कोकणात जाण्यासाठी होऊ लागला. कोकणातील सर्व दळणवळणाची कामं याच पुलावरुन होऊ लागली.
  एकीकडे ब्रिटीशांनी बांधलेल्या पुलाची मर्यादा शंभर वर्षांपेक्षा जास्त नाही हे ते स्वतः पत्र पाठवून राज्य शासनाला कळवतात. आपल्या राज्यात बनवलेले अनेक पुल हाताच्या बोटावर मोजण्या इतकी वर्ष झाल्यावर कोसळल्याच्या घटना आहेत. त्यामुळे या शिवरायांच्या काळात बांधलेल्या पुलाकडून सरकारनं बोध घेण्याची गरज व्यक्त केली जात आहे. दरम्यान, छत्रपती शिवाजी महाराजांची दूरदृष्टी किती होती याचं उत्तम उदाहरण म्हणून या पुलाचा आपण उल्लेख करू शकतो.
टीप: हा पूल छत्रपती शिवाजी महाराजांनी बांधला आहे कि नाही यावरून इतिहासकारांमध्ये मतभेद आहेत. 
  अलिकडेच रत्नागिरी-पुणे हा प्रवास कमी वेळात होण्यासाठी खेड-आंबिवली-बिरमणि-हातलोट-पार असा रस्ता मंजुर झाला आहे. तेव्हा या परिसरातील दळणवळण वाढेल आणि मधुमकरंदगड अधिक पर्यटकांचे आकर्षण बनेल.   

 नकट्या रावळाची विहीर (पायविहिर)

पंताचा कोट या किल्ल्यात एक पायविहीर असून स्थानिक लोक तिला नकट्या रावळाची विहीर या नावाने ओळखतात. विहीर किल्याच्या पश्चिम टोकास असून कोयना नदीच्या पात्रापासून सुमारे २४ मी उंचीवर आहे.विहीर म्हणजे जलस्त्रोताचे जिवंत झरे असतात, तसेच जलसंस्कृतीच्या ठिकाणी जलदेवता व इतर दैवतांचे कोरीव काम साधारणतः सर्व जल उगम व साठा या ठिकाणी हमखास दृष्टीपथास येते, मात्र येथील विहिरीत ना पाण्याचे झरे, ना जलदेवतांच्या कोरीव आकृती. या सर्व गोष्टींचा अभाव असलेल्याने नक्की ही विहीर पाण्याच्या वापरासाठी निर्माण केली होती की इतर उद्देशाने याचा मनात संम्रभ निर्माण होतो. काहींच्या मते शत्रूच्या सैन्यापासून लपून राहण्यासाठी या विहिरीचा वापर होत असावा. कोयनानदीच्या पात्रतातून चुनेगच्ची खापरी जलवाहिकेच्या माध्यमाने येथे पाणी आणले असावे ही शक्यता वाटते, पण इतक्या भल्यामोठ्या विहिरीतील पाणी उपसा करण्यासाठी ना रहाटाचे, ना मोटेचे हौदे असल्याचे पुरावे दिसत नाही.
ही विहीर सुमारे ४१.५ मी लांब असून त्यात ३०.५मी लांबीचा सोपनमार्ग व खाली ११×११ मी चौरासकृती पाण्याची विहीर आहे. विहिरीचा ईशान्य बाजूकडील काही भाग गोलाकार आहे.मात्र उद्देश किंवा उपयोग कशासाठी होत असावा याबाबत अनभिज्ञता आहे. विहीरीच्या आत उतरण्यासाठी ८२ पायऱ्या आहेत. दर २० पायऱ्यानंतर एक मोठी पायरी आहे.  वीस पायऱ्या चढल्यावर किंवा उतरल्यावर विसावा घेण्यासाठी त्या केल्या असू शकतील.पहिल्या वीस पायऱ्या उतरून गेल्यावर विहिरीच्या अंतर्गत तटबंदी बांधकामातून दोन्ही बाजूने एक माणूस विहिरीरच्या हौद्याकडे जाऊ शकेल अशी रचना आहे.  जेथे पायऱ्या संपतात तेथे दोन विशाल दगडी स्तंभावर एक मोठी कमान उभारण्यात आली आहे. या कामानीत दोन उपमार्ग आहेत. या विहिरीचे बांधकाम दगडी चिरे आणि चुन्यात केले आहे. नदीच्या बाजूने नंतरच्या काळात विटांनी एक धक्का बांधण्यात आला असावा. विहिरी बाबतची नोंद सन १७५० मध्ये उपलब्ध होती. या विहिरीचा उपयोग केवळ पाणी साठवण्यासाठी होत नसावा. दगडी बांधकामात विशिष्ट अंतरावर सलगपणे खाचा ठेवलेल्या आहेत. त्यामुळे वेळप्रसंगी त्यात मोठ्या लाकडी किंवा लोखंडी तुळया ठसवून या विहिरीचे सहा ते सात मजल्यामध्ये परिवर्तन करणे शक्य होत असावे. आजही काही खाचत लाकडी तुळया दिसून येतात. तसेच त्या त्या टप्प्यावर उतरण्यासाठी जिने ठेवलेले आहेत. याशिवाय विहिरीच्या प्रवेश मार्गांवर मजबूत अशी दगडी भिंत उभारण्यात आलेली आहे. केवळ पाणी साठवण्यासाठी तिचा उपयोग होत नसावा किंवा शेजारची परस्थिती पाहता शत्रूशी लढताना दबा धरून बसण्यासाठी ही जागा वाटत नाही. अनेक मजली असलेली ही विहीर कदाचित महत्वाच्या वस्तूंचा साठा करण्यासाठी कोठार म्हणून उपयोग येत असावी. ही वास्तू केंद्रीय विभागाने सुरक्षित स्मारक म्हणून घोषित केलेली आहे. विहिरीत खापरी पाटामार्फत (भाजलेल्‍या मातीचा पाईप किंवा पाट) कोयनेचे पाणी सोडले जात असावे. त्यामुळे तिची खोली कोयनेच्या पात्राइतकी असावी. अनेक मजल्यांच्या विहिरीचा उपयोग पाणीपुरवठ्यासाठी किंवा वस्तूंच्या साठ्यासाठी करत असावेत असे सातारा गॅझेटियर म्हणते.
   कराडच्या वैभवशाली संस्कृतीचा वारसा असलेल्या या विहिरीला नकट्या रावळाची विहीर हे नाव व तिचा नक्की वापर याबाबत पुरेशी माहिती उपलब्ध होत नसल्यामुळे मनात उत्सुकता निर्माण होते. काळाच्या उदरात गडप झालेले रहस्य शोधण्याचा इतिहास संशोधक नक्कीच प्रयत्न करतील अशी मला मनोमन आशा वाटते. सर्वसामान्य जनतेकडे जर काही पुरातन कागद, ताम्रपट किंवा इतर विश्वसनीय माहिती असल्यास ती प्रसिध्द करावीत. कोयना व कृष्णा नदीचा संगम परिसर दर्शनीय आहे. संगमावरील स्व. यशवंतराव चव्हाणांची अष्टाकृती समाधी दर्शनाने समाज जीवनात लोकाभिमुख सामाजिक कार्याची प्रेरणा मिळते. घाटावर असलेल्या मंदिरांची भलीमोठी शृखंला आहे. कराडचे ग्रामदैवत कृष्णामाई मंदिर, काशी विश्वेश्वर मंदिर, कार्तिकस्वामी मंदिर व इतर देवतांच्या दर्शनासाठी नक्कीच एकदा कराडला गेले पाहिजे!

 कात्रेश्‍वरामुळे "कातरखटाव':-

       खटाव तालुक्‍यातील कातरखटाव या गावाचे पूर्वीचे नाव कवठे असे होती. कवठेश्‍वर हे या गावचे ग्रामदैवत. पुढे या गावाला कातरपट्टे असे म्हटले जाऊ लागले आणि त्याचा अपभ्रंश कातरखटाव असा झाला. आता हे गाव कातरखटाव या नावाने ओळखला जाते. या गावाच्या नावातील बदलाची दंतकथा सांगितली जाते. कवठेच्या उत्तर बाजूने कवठाई नदी वाहते. हीच नदी पुढे येरळा नदीस मिळते. या कवठे गावात शिवदास नावाचा गवळी हा शंभू महादेवाचा निस्सीम भक्‍त होता. त्याच्या आयुष्याची संध्याकाळ होत आली होती. मात्र, दर सोमवारी शिखर शिंगणापूरच्या महादेवाच्या पायी वारीचा नियम त्याने सोडला नव्हता. अशाच एका सोमवारी भल्या पहाटे शिवदास उठला, पाण्याची कावड घेऊन नदीवर गेला, स्नानसंध्या उरकली, कावड पाण्याने भरली आणि हर हर महादेव म्हणत तो शिखर शिंगणापूरचा रस्ता जवळ करू लागला. त्यावेळी गावाच्या उत्तरेस अरण्य होते. त्यातून मार्गक्रमण करत शिवदासानी शंभू महादेवाच्या जपाच्या बळावर शिखर शिंगणापूर गाठले. कावडीतून आणलेल्या कवठाई नदीच्या पवित्र जलाने शंभू महादेवास अभिषेक केला आणि भक्‍तिभावाने हात जोडले. शिवदासाची भक्‍ती पाहून शंभू महादेव प्रसन्न झाले. ते शिवदासला म्हणाले, तुला काय हवं आहे, ते माग. तेव्हा शिवदास म्हणाला, मला काही नको. फक्‍त तूच मला हवा आहेस. त्यावर महादेव म्हणाले, आता तुला इतक्‍या लांब माझ्यापर्यंत येण्याची गरज नाही. मीच तुझ्याकडे वास्तव्यास येतो; पण एक लक्षात ठेव, तुझ्या गावापर्यंत जाईपर्यंत मागे वळून बघायचे नाही.
शिवदासाने कावड घेतली आणि कवठेचा रस्ता धरला. शिवदास गावापासून हाकेच्या अंतरावर आला आणि त्याच्या मनात शंका आली की, देव माझ्या मागोमाग आले आहेत का? शंका आल्याने शिवदासाने मागे वळून पाहिले असता, कोणीच दिसलेच नाही. शिवदास निराश झाला. त्याला वाटले देवाने आपल्याला फसवले. तो निराश होऊन घरी आला. विचार करतच झोपी गेला. झोपेत शंभू महादेवांनी शिवदासास दृष्टांत दिला आणि सांगितले की, तू ज्या ठिकाणी मागे वळून पहिलेस, त्या ठिकाणी मी गुप्त झालो. तेथे तुला शिवलिंग सापडेल. शिवदास खडबडून जागा झाला. तो आपली बैलजोडी आणि नांगर घेऊन शंभू महादेवांनी दृष्टांत दिलेल्या ठिकाणी येऊन थांबला. शिवनामाचा जप करत त्याने जमीन नांगरायला सुरुवात केली. जमीन नांगरत असताना शिवदासाला मोठा आवाज ऐकू आला आणि जमिनीतून रक्‍ताच्या चिळकांड्या उडू लागल्या. त्या क्षणी नांगर सोन्याचा झाला. रक्‍ताचे रूपांतर पाण्यात झाले आणि शिवलिंग वर आले. मात्र, शिवलिंगाची साळुंखी नांगराच्या फाळाने कातरल्याचे दिसले. त्यामुळे शिवलिंगास 'कात्रेश्र' म्हणून संबोधले जाऊ लागले. त्यामुळे कवठेचे नाव कातरपट्टे, असे झाले. पुढे या शब्दाचा अपभ्रंश होत आजचे 'कातरखटाव' झाले. 
कात्रेश्वरातील कन्नड शिलालेख
      कातरखटाव येथील कात्रेश्वराची रचना देखील गुरसाळ्याच्या रामेश्वर मंदिरासारखीच आहे. फक्त याच्या समोरील पुष्करणी थोडी बाजूला आहे. कात्रेश्वराच्या मंदिराची व पुष्करणीची सध्याची अवस्था अतिशय बिकट आहे. मंदिराच्या दर्शनी भागातील शिल्पपटाचेदेखील नुकसान झाले आहे. या मंदिराचे वैशिष्ट्य म्हणजे इथे असणारा कन्नड शिलालेख. तो देखील भग्न आहे. हजार एक वर्षांच्या इतिहासाच्या मूक साक्षीदार असणाºया विरगळी, नंद, भग्न मूर्ती मंदिर परिसरात उघड्यावर विखरून पडल्या आहेत.

गुरसाळेचे रामेश्वर मंदिर :- 

  मध्यप्रदेशातील खजुराहो येथील मंदिरे कामशिल्पासाठी प्रसिद्ध आहेत. अशाच प्रकारची तीन मंदिरे सातारा जिल्ह्यातील गुरसाळे, परळी आणि कारखटाव येथे आजही आपले अस्तित्व टिकवून उभी आहेत. 
आज जगभरात असलेल्या प्राचीन वास्तूंकडे पर्यटनाचे साधन तसेच कलेइतिहासाचा वारसा म्हणून पाहिलं जातं. महाराष्ट्रात तर हा ठेवा खेडोपाडी विखुरलेला आहे. त्यास सातारा देखील अपवाद नाही. सातारा जिल्ह्यातही अनेक प्राचीन मंदिरे, किल्ले, गड अशा अनेक ऐतिहासिक वास्तू आजही आपले अस्तित्व टिकवून उभ्या आहेत. मध्यप्रदेशातील खजुराहो येथील हजारो वर्षे जुनी असलेली मंदिरे कामशिल्पासाठी प्रसिद्ध आहेत.
      वडूज-कराड मार्गापासून 5 किलोमीटर अंतरावर हे गाव आहे.तिथलं मंदिर आणि त्याच्या समोरच भव्य पुष्करणी.
त्याची रचना पाहिली की पुणे जिल्ह्यातील बारामतीजवळील लोणीभापकरच्या मंदिराची आठवण येते.
स्थानिक रहिवाशांच्या माहितीनुसार, ही वास्तू फार पूर्वीची, कदाचित शिवकालीन असावी. हा सारा परिसरच 'रामलिंग' या नावाने ओळखला जातो. त्याच ठिकाणी ही शिवकालीन पुष्करणी किंवा बारव आहे.
महाराष्ट्र शासनाने वर्षांपूर्वी हे मंदिर ऐतिहासिक पर्यटन स्थळ म्हणून घोषित केलं. बारवेची स्वच्छता करण्यात आली. त्यावेळेस अहिल्याबाई होळकरांचा वंशज श्री. यश होळकर उपस्थित होते. 
या बारवेचं दगडी बांधकाम मोडकळीस आलंय. गुरसाळे गावामध्ये सोमलिंग, गुपितलिंग, रामलिंग, भावलिंग, शिवलिंग अशी एकूण पाच लिंग आहेत. ही पाच शिवलिंग पूजली जातात. तिथं महाशिवरात्रीला मोठ्या उत्साहात यात्रा भरवली जाते.
हा वारसा आणखी किती दिवस टिकणार हा प्रश्न आहेच..
       माणसाच्या जीवनात जल, अन्न आणि निवारा हे मूलभूत घटक आहेत. जल अर्थात पाणी या घटकाला तर विशेश महत्त्व आहे. माणसाने वस्ती करण्यास सुरुवात केली तीही जलसाठ्यांच्या किनार्‍यावरच केली. पृथ्वीवरील प्रार्थनास्थळांत असलेल्या देवदेवतांसाठीही माणसाने जलसाठे तयार केले. यावरून पाण्याला अतिशय महत्त्व आहे हे स्पष्ट होते.
जलसाठे करण्यासाठी माणसाने शास्त्र आणि तंत्रज्ञानाचा अचूक वापर केला आणि तळी, कुंड, विहिरी, बारव अशा विविध निर्मिती करून पाणी साठवण्यास सुरुवात केली. यापैकी बारवात जलसंवर्धन आणि स्थापत्य कलेची उत्कृष्ट सांगड दिसते. 8व्या आणि 9व्या शतकात बारवा बांधल्या जाऊ लागल्या. त्यानंतर 11व्या आणि 13व्या शतकात त्यांचा मोठ्या प्रमाणात विस्तार, जतन आणि पुर्नबांधणी झाली.
      बारव म्हणजे काय? हा प्रश्न अनेकांना पडतो. बारव हा एक प्रकारचा जलसाठाच असतो. मात्र बारवांचे वैशिष्ट्य म्हणजे गोल, चौरस वा किल्लीच्या आकारात बांधलेल्या या जलसाठ्यांना पायर्‍या असतात. म्हणूनच इंग्रजीत बारवांना स्टेपवेल म्हणतात. एकात एक लहान होत जाणारे तीन ते सात टप्पे हे बारवाचे स्वरुप असते. या बारवांचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे या बारवांत पाण्याचे अंतर्गत स्त्रोत असतात. आपण पावसाचे पाणी अडविणे, ते मातीत जिरवणे आणि साठवणे यासाठी अनेक योजना केल्या आहेत. पण पाऊसच पडला नाही तर काय होईल?
         पाऊस पडला नाही तरी बारवातील अंतर्गत स्त्रोतातून भूगर्भातील पाणी झिरपून बारवात पाणी भरते. दुष्काळात या पाण्याला अनन्यसाधारण महत्त्व आहे. म्हणूनच बारवातील पाण्याची स्वच्छता राखणे, बारवातील गाळ काढून अंतर्गत स्त्रोताचा मार्ग मोकळा करणे, बारवाच्या भिंतीतून होणारी गळती थांबवणे, झाडे, झुडपे, पाण्यातील वेली काढून टाकणे या सर्व प्रक्रिया करून बारवाची निगा राखली तर दुष्काळातही पिण्याचे पाणी उपलब्ध होऊ शकते. एक वर्ष पाऊस पडतो तर दुसर्‍या वर्षी दुष्काळ असतो अशी सध्याची हवामानाची स्थिती आहे. अशा स्थितीत बारवांसारखे जलसाठे जतन करणे अत्यंत महत्त्वाचे आहे. जलदान आणि जलसंरक्षण हे पुण्य कार्य आहे.
गेल्या अनेक दशकांपासून ज्या बारवांनी आपली तहान भागवली त्या बारवांकडेच आपण दुर्लक्ष केले. बारवांची निगा राखण्यासाठी आपण निधी नाही म्हणतो आणि दुष्काळात 20 रुपये लिटरने पाणी विकत घेण्यास मात्र आपण तयार होतो. आपण आजवर ज्या चुका केल्या त्या सुधारण्याची आता वेळ आली आहे. बारवांचे स्थापत्य सौंदर्य न्याहाळात त्यातील स्वच्छ पाणी औंजळीने पिण्याचे स्वप्न पूर्ण करूया. लोकसहभाग आणि जलसंवर्धनासाठी दान देत अखंड महाराष्ट्रात बारव संवर्धनाच्या उपक्रमाची सुरुवात करूया.
  खटाव तालुक्यात गुरसाळे येथील रामेश्वराचे मंदिर, कातरखटाव येथील कात्रेश्वराचे मंदिर व सातारा तालुक्यातील परळी येथील केदारेश्वराचे मंदिरही अशाच प्रकारच्या शिल्पांसाठी प्रसिद्ध आहे.या मंदिरांवर कोरलेल्या कामशिल्पांमुळेच ही मंदिरे महाराष्ट्रातील खजुराहो म्हणून अल्प परिचित आहेत. मंदिरावर कामशिल्पे का असावीत, याबाबत संशोधकांचे वेगवेगळे मतप्रवाह आहेत. परंतु ही मंदिरे तांत्रिक उपासना सांप्रदायाच्या प्रभाव असणाऱ्या काळात उभारली गेली, यावर बहुतांश संशोधकांचे एकमत आहे. मद्य, मांस, मस्य, मुद्रा व मैथुनी या पाच गोष्टींना मिळून पंचमकार अशी संज्ञा तयार होते. याच गोष्टीचे वा उपासनामार्गाचे शिल्पांकन साताºयातील या तीन मंदिरांवर केलेले आढळते.
        जिल्ह्याला या मंदिरांच्या रुपाने ऐतिहासिक वारला लाभला आहे. अनेक दशकांपासून उभी असलेली ही मंदिरे साताºयातील खजुराहो म्हणून ओळखली जातात. सध्या काही मंदिरांची दुरवस्था झाली आहे. हा ऐतिहासिक वारसा जतन करण्यासाठी पुरातत्व विभागाच्या वतीने ठोस पावले उचलावीत, अशी मागणी नागरिकांमधून होत आहे.
गुरसाळेतील पुष्करणी वैशिष्ट्यपूर्ण
      गुरसाळे येथील रामेश्वर मंदिराचे छत मोठ्या दगडी शिळांचे बनलेले आहे. बाजूच्या भिंती आतून बाहेरून सपाट आहेत तर दर्शनी बाजू अलंकृत आहेत. मंदिराच्या बाहेरील दर्शनी बाजू पाने, फुले, वेगवेगळ्या भौमितिक रचनाच्या थरांनी सजवलेल्या आहेत. यातीलच सर्वात वरच्या थरात कामशिल्पांचे चित्रांकन केले आहे. या शिल्पात युगूल शिल्पे, मैथून शिल्पे, वेगवेगळ्या कामक्रीडांचे चित्रण असलेली शिल्पे आहेत. या मंदिराच्या प्रांगणात असणारी पु्ष्करणी हे आणखी एक वैशिष्ट्य. पुष्करणी किंवा बारव म्हणजे चौकोनी आकाराचा उतरत्या पायºयांची रचना केलेले कुंड.

सज्जनगड :-

  || दास डोंगरी राहतो,
यात्रा रामाची पाहतो |
देव भक्तासवे जातो, ध्यान रुपे ||
           महाराष्ट्रातील काही किल्ल्यांना इतिहासात एका विशिष्ठ कारणामुळे महत्व आलेले आहे. समर्थ रामदासांच्या वास्तव्याच्या पाउलखुणा आणि त्यांच्या समाधीला कुडीत जपणारा सज्जनगड प्रत्येक दुर्गप्रेमी आणि सर्वसामान्य पर्यटकांसाठी महत्वाचा आहे. समर्थ रामदासांची आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्या संदर्भात चर्चा असेल तर या सज्जनगडाचा नामोल्लेख येणारच, त्यामुळे शिवकालीन इतिहासात सज्जनगडाचे विशेष स्थान आहे.
सह्याद्रीच्या पर्वतरांगेतील शंभू महादेव या नावाने ओळखली जाणारी एक डोंगररांग सातारा जिल्ह्यात पुर्व दिशेस विस्तृतपणे वाढत जाते.या शंभू महादेव डोंगररांगेवरच सज्जनगड म्हणजेच परळीचा किल्ला वसलेला आहे. 
 सज्जनगडाचा इतिहास :
परळी गावाच्या शेजारी असलेल्या डोंगरावर पूर्वी आश्वालायन ऋषींचे वास्तव्य होते, असे म्हणतात. त्यामुळे या किल्ल्यास अपभ्रंश स्वरुपात ‘अस्वलगड’ असे म्हटले जात असे.अस्वलांची येथे वस्ती म्हणून अस्वलगड असेही सांगितले जाते.आश्वलायनगड हे नाव त्या भागात आढळणाऱ्या अस्वलांमुळे की आश्वलायन ऋषींनी ह्या डोंगरावर वास्तव केले म्हणून रूढ झाले हे नक्की सांगता येत नाही. साधारणपणे १०-११ व्या शतकात शिलाहारांनी सातारा किल्ल्याबरोबर ह्या परळीच्या किल्ल्याची बांधणी केले असे मानले जाते. चवथा बहमनी राजा महमद शहा (१३५८-१३७५) याच्या कारकिर्दीत परळीच्या किल्ल्याचा उल्लेख आढळतो. बहमनी राजांकडून हा किल्ला विजापूरच्या आदिलशाहीकडे गेला. त्यांनी किल्ल्याला नवरसतारा हे नवीन नाव दिले. इब्राहिम आदिलशहाने या गडाचे नाव ‘नवरसतारा’ ठेवण्यामागील कारण सांगताना साकी मुस्तैदखान लिहितो की, ‘‘तो प्रत्येक नवीन गोष्टीला ‘नवरस’ हे नाव देत असे. उदाहरणार्थ नवरसनामा, नवरसपूर गाव आणि नवरस नाणे. त्यास अनुसरून किल्ल्याचे नाव ‘नवरसतारा’ ठेवण्यात आले.’’सज्जन गडाच्या पायथ्याशी परळी नावाचे गाव असल्यामुळे, या किल्ल्यास परळीचा किल्ला असे देखील म्हणतात. शिवाजी महाराजांनी इ.स. १६७३ मध्ये सातारच्या किल्ल्याबरोबर परळीचा किल्ला आदिलशाहीकडून जिंकून घेतला. नंतर महाराजांनी समर्थांना एखाद्या किल्ल्यावर राहण्याची विनंती केली  त्याप्रमाणे समर्थांनी महिपतगड आणि नंतर परळीचा किल्ला न्याहाळला. शेवटी समर्थांनी आटोपशीर परळीचा किल्ला निवडला. याच सुमारास परळीच्या किल्ल्याचे सज्जनगड असे नामकरण झाले. संतसज्जनांचे वास्तव्य म्हणून सज्जनगड हे नाव रूढ झालेले असले तरी श्री रामदासी संशोधन – पांधरी व चाफळ खोरे यातील ३२९ व्या बाडात समर्थांची १४ नावे दिली आहेत. त्या चौदा नावांपैकी एक नाव सज्जन. त्यामुळेच सज्जन म्हणजे रामदासस्वामी राहतात तो सज्जनगड अशी पण एक शक्यता सज्जनगड नावामागे असावी.  महाराजांनी २,००० होन खर्च करून समर्थांसाठी मठ बांधून घेतला. तोपर्यंत समर्थांबरोबर आलेले संतसज्जन आणि शिष्यपरिवार यांचे वास्तव किल्ल्यांवरील ओवऱ्यातच होते. शिवाजी राजांच्या राज्याभिषेकानंतर स्वराज्याचे पहिले छत्रपती या नात्याने छत्रपती शिवाजीराजे भोसले सज्जनगडावर समर्थ रामदासांच्या भेटीसाठी आले होते.शके १५७५ (सन १६७३) ते शके १६०३ (सन १६८१) पर्यंत म्हणजे समर्थ समाधी घेईपर्यंत ह्या किल्ल्यावर वास्तव्य करून होते. समर्थांच्या एवढ्या प्रदीर्घ वास्तव्यामुळे हा किल्ला रामदासी संप्रदायाचे तीर्थक्षेत्र बनला. समर्थांच्या वास्तव्यानंतर ह्या किल्ल्याचा इतिहास समर्थ रामदास आणि रामदास संप्रदाय यांच्याशीच निगडीत राहिला.संपूर्ण महाराष्ट्राला बलोपासनेची समर्थ रामदासस्वामी यांनी ओळख करून दिली. शक्तीची देवता हनुमान वेशीचा रक्षक म्हणून वेशीच्या बाहेर पुजला जात होता. परंतु समर्थांनी त्याला वेशीच्या आत आणून त्याची पूजा मोठ्या प्रमाणात सुरु केली. ३ नोव्हेंबर, इ.स. १६७८ रोजी शिवरायांनी संभाजी महाराजांना समर्थांकडे पाठवले. पण ३ डिसेंबर, इ.स. १६७८ रोजी संभाजी महाराज सज्जनगडावरून जाऊन दिलेरखानाला मिळाले. शिवरायांच्या निधनानंतर १८ जानेवारी, इ.स. १६८२ रोजी श्री राममूर्तींचे गडावर स्थापना करण्यात आली. छत्रपती शिवाजी महाराजांच्या निधनानंतर इ.स. १६८२ मध्ये सज्जनगडावर श्रीरामाचे मंदिर बांधून तेथे राममूर्तींची स्थापना करण्यात आली. २२ जानेवारी १६८२ मध्ये समर्थ रामदासांचे निधन झाले. समर्थ रामदासांचे रामदासी, रामदासांच्या निधनानंतर देखील सज्जनगडावर श्रीराम मंदिरात रामदासांच्या समाधीजवळ राहत होते. यावेळी समर्थ रामदासांच्या शिष्या अक्कास्वामी यांनी मठाची व्यवस्था पाहिली होती. पुढे २१ एप्रिल १७०० रोजी साताऱ्याचा किल्ला प्रयागजी प्रभू यांच्याकडून जिंकून घेतल्यानंतर औरंगजेबाची नजर सज्जनगडाकडे वळली. साताऱ्याचा किल्ल्यावरील प्रयागजी प्रभू यांना सज्जनगडावरील परशुराम त्रिंबक प्रतिनिधींचे सहाय्य होत होते. औरंगजेब ३० एप्रिल १७०० रोजी सज्जनगडाच्या वेढ्यात सामील झाला. किल्ल्यावर होणाऱ्या  हल्ल्यांचे गांभीर्य ओळखून परशुराम त्रिंबक प्रतिनिधी व उध्दवस्वामी यांनी गडावरील सर्व मूर्ती व अन्य पूजनीय वस्तू घेऊन गड सोडला आणि कोयनेच्या खोऱ्यातील दुर्गम वासोटा (व्याघ्रदुर्ग) किल्ला गाठला.ऐतिहासिक संदर्भात ७ मे १७०० मध्ये औरंगजेबाने गडाखालील मोर्चाची पाहणी केली. बाणदारांना बाण किल्ल्यात फेकण्यास सांगितले. दोन दारूचे बाण किल्ल्याच्या दिशेने सोडण्यात आले. ३१ मे फतेहुल्लेखानाने लिहून पाठवले की, ‘‘मी पगाराचे वाटप केले. उद्या मी हल्ला करणार आहे. त्यासाठी शिडय़ा तयार केल्या आहेत. मला धनुष्य व बाणांचे भाते देण्यात यावेत.’’  ९ जून १७०० रोजी औरंगजेबाच्या ताब्यात देण्यात आला. १३ जून १७०० रोजी गडावर विजय मिळवल्यानंतर औरंगजेब डोक्याला शिरपेच बांधून किल्ला पाहण्यास गेला व गडावरील सर्व नवी मंदिरे जमीनदोस्त करण्याचा त्याने हुकूम अमलात आणला गेला.किल्ल्याचे सज्जनगड हे नाव बदलून  गडाच्या विशिष्ठ ठिकाणावरून त्याचे नवरसतारा असे करण्यात आले. औरंगजेब या भागातून निघून गेला आहे ह्या संधीचा फायदा घेऊन मुघलांकडून इ.स. १७०९ मध्ये परशुराम त्रिंबक प्रतिनिधींनी सज्जनगड पुन्हा मराठेशाहीच्या राजवटीखाली सहभागी करून घेतला.किल्ला ताब्यात आल्यानंतर वासोटा किल्ल्यावरील सर्व मूर्ती व अन्य पूजनीय वस्तू पुन्हा सज्जनगडावर आणून त्यांची पुन्हा प्राणप्रतिष्ठा करण्यात आली. यानंतर येथील मंदिरांची पुनर्बाधणी व डागडुजी करण्यात आली.इ.स. १८१८ मध्ये सज्जनगड ब्रिटीशांच्या राजवटीत कंपनी सरकारच्या अधिपत्याखाली आला.
जावे कसे ? :-
  सज्जन गडावर जाण्यासाठी दोन वाटा आहेत. कोणत्याही वाटेने गेल्यानंतर पायऱ्या चढून गडावर जावे लागते.
परळी गावामधून : सातारा गावामधून सज्जनगड किल्ल्याचे पायथ्याचे गांव परळी साधारणपणे १० किमी वर आणि इथपर्यंत येण्यासाठी चांगला डांबरी रस्ता आहे. परळी गावातून किल्ल्यावर जाण्यासाठी अंदाजे ७५० पायऱ्या बांधलेल्या आहेत. ह्या वाटेने एका तासात आपण किल्ल्यावर जातो
गजवाडी पासून : त्याचबरोबर सातारा-परळी रस्त्यावर गजवडी गावातून किल्ल्यावर जाणारा डांबरी रस्ता आहे. तेथून गडावर जाता येते.ह्या मार्गाने गेल्यास जास्तीतजास्त ५० पायऱ्या चढाव्या लागतात. सातारा शहरातून थेट गडाच्या वाहनतळापर्यंत बस सेवा आहे.स्वत:चे वाहन असेल तर गजवडीमार्गे गडाच्या निम्म्या उंचीपर्यंत असणार्‍या वाहनतळावर पार्क करुन थोड्या पायर्‍या चढून गडमाथा गाठता येतो. या मार्गावर सातारा-सज्जनगड एसटी सेवा पण उपलब्ध आहे. स्वतःचे वाहन असलेल्यांनी आणि ज्यांना ७५० पायऱ्या चढायच्या नसतील त्यांनी ह्या मार्गाचा वापर करायला हरकत नाही. ज्यांना किल्ला मुख्य वाटेने चढायचे आहे त्यांनी परळीच्या वाटेने चढाई करावी.
        समर्थ दर्शन : सज्जनगडाच्या पायथ्यापर्यंत पोचत असताना, वाटेवर उजव्या बाजूस हनुमानाची उंच मुर्ती नजरेस पडते. गजवडीमधुन घाट चढुन आपण सज्जन्गडकडे जाताना उजव्या हाताला "ज्ञानश्री ईन्स्टिट्युट ऑफ टेक्नॉलॉजी" या नव्याने झालेल्या शैक्षणिक संस्थेच्या आवारातच हि समर्थ सृष्टी उभारलेली आहे. समर्थ वाड:मयाचे अभ्यासक अरुण गोड्बोले याांची हि संकल्पना.
        समर्थांच्या आयुष्यातील दहा-पंधरा महत्त्वाचे प्रसंग निवडून ते साकार करणारा सहा हजार चौरस फूटांचा एक हॉल, समर्थस्थापित अकरा मारूतींच्या प्रतिकृतींचा तीन हजार चौरस फुटांचा दुसरा हॉल व लघुपट दाखवण्यासाठी दीडशे सीट्सचे मिनी थिएटर असे ‘थीम पार्क’चे स्वरूप आहे. त्याला जोडून बुक स्टॉल, उपहारगृह व चार-पाच दुकाने आणि प्रसाधनगृहे ही सारी योजना आहेच. बाबासाहेब पुरंदरे, मारूतीबुवा रामदासी, मोहनबुवा रामदासी, चित्रकार चंद्रमोहन कुलकर्णी यांचे सहकार्य मिळत गेले. आंतरराष्ट्रीय कीर्तीचे पर्यटन तज्ज्ञ राजीव जालनापूरकर यांनी काही महत्त्वाच्या सूचना दिल्या. त्याचे एकूण बजेट दीड कोटींवर गेले. भाई वांगडे आणि त्यांचे सहकारी व पुण्याच्या ‘गार्डियन ग्रूप’चे सर्वेसर्वा मनीष साबडे या दोघांनी त्यासाठी आनंदाने सहकार्य देऊ केले आणि ‘समर्थ दर्शन टुरिझम व्हेंचर’ या नावाने प्रकल्पाची उभारणी केली गेली.
ऐतिहासिक भासावे म्हणून सर्व बांधकाम जांभा दगडात केले आहे. तो कोकणातून आणण्यात आला. कोल्हापुरच्या विजय डाकवे यांनी सिव्हिल वर्क केले. कलादिग्दर्शक अभय एकवडेकर यांनी समर्थ जीवनातील प्रसंगांच्या उभारणीची धुरा सांभाळली. त्यासाठी फायबरचे पुतळे, अन्य साहित्य यांचे काम सुरू झाले. कट-आऊटसाठी वेशभूषा करून, कलाकार निवडून फोटोग्राफी करण्यात आली. अकरा मारूतींच्या प्रतिकृतींचे काम बंगाली कलाकार चॅटर्जी यांच्या मार्गदर्शनाखाली झाले. लायटिंगची जबाबदारी राहुल दीक्षितने तर फोटोग्राफी विजयेंद्र पाटील यांनी सांभाळली. पाटील यांनीच समर्थांच्या तीर्थस्थानांच्या लघुपटाचे शुटिंग जांब, टाकळी, चाफळ, शिवथरघळ आणि सज्जनगड येथे जाऊन केले.
       समर्थांचे घर, जन्म, बालपण, उपासना, विवाहमंडपातून पलायन, टाकळीतील वास्तव्य - तेथील तपस्या, गोमय मारुतीची स्थापना, मोगली अत्याचार, बद्रिनाथला हनुमंत स्थापना, महाराष्ट्रात आगमन, चाफळ, दासबोध लेखन व आनंद भुवन हे प्रसंग उत्कट रीत्या हुबेहूब साकार झाले आहेत. मारुती दर्शन हॉलमध्ये अकरा मारुतींच्या प्रतिकृती, त्याच्या पार्श्वभूमीवर तेथे जाण्याचा नकाशा व तेथील नवी मंदिरे असे दाखविले आहे. प्रत्येक मारुतीची माहिती देणारे फलकही आहेत. दीडशे क्षमतेचे चित्रपटगृह, प्रोजेक्टर, साऊंड व तेथे समर्थांवर डॉक्युमेंटरी दाखवीली जाते. भाई वांगडे यांच्या हस्ते शास्त्रोक्त उदकशांत करून प्रकल्प मार्च २०१२ मध्ये पूर्णत्वाला आला.
आत प्रवेश केल्यानंतर समर्थांचा जन्म , बालपण, विवाह वेदीवरुन पलायन, तपस्या हे जीवनातील महत्वाचे ट्प्पे मुर्तींच्या माध्यमातुन दाखविले आहेत.
या शिवाय समर्थ स्थापित अकरा मारुतींच्या मुर्तींचे दर्शन घडविणरे वेगळे दालन आहे.
सुदैवाने ईथे फोटोग्राफीला बंदी नाही.समर्थांच्या जीवनावर एकूण पंधरा दालने आहेत. एका कुटीत समर्थांच्या हस्ताक्षरातील काही पत्रे आहेत, त्यात त्यांचे गद्य स्वरुपातील एकमेव पत्र आहे. या शिवाय समर्थांनी बालवयात टाकळी ईथे लिहीलेल्या वाल्मिकी रामायणातील काही कागद, त्यात रेखाटलेली चित्रे, समर्थांचे व कल्याणस्वामींचे अस्सल चित्र हे सर्व आपल्याला त्या काळात नेउन आणतात. हे सर्व मान जांभ्या दगडात केल्यामुळे एक वेगळे सौंदर्य आलेले आहे. उगाच जाउन मुर्तींच्या पाया पडण्यापेक्षा हे सर्व डोळसपणे पाहिले पाहिजे. हे प्रदर्शन पाहून आल्यानंतर डाव्या हाताला एक प्रेक्षागॄह आहे, जिथे समर्थांचा जीवनपट दाखविला जातो. ईथे छोटे उपहारगॄहही आहे जिथे चहा, नाष्ट्याची सोय होउ शकते.
        या टप्प्यावरून आपल्याला समोरच किल्ला आणि किल्ल्यावर जाणारी पायऱ्यांची वाट नजरेस पडते. ह्या वाटेवर  समर्थ रामदासस्थापित मारुतींच्या मूर्तींची स्थापना करण्यात आलेली आहे.
साधारणपणे अर्ध्या पायऱ्या चढून गेल्यानंतर गायीचे व मारुतीचे मंदिर आहे. ह्या मंदिराजवळच परळी गावातून येणारी वाट आपल्या वाटेला येऊन मिळते. कड्यावरून पडलेल्या गायीच्या स्मरणार्थ १९२२ साली ह्या मंदिराची उभारणी झालेली आहे.  मंदिरात सवत्सधेनूची मूर्ती आहे. ह्या मंदिरासमोरच मारुतीचे छोटेसे मंदिर आहे.
      मंदिराच्या थोडे पुढे गेल्यानंतर मुख्यवाटेपासून उजवीकडे जाणारी छोटी पायवाट. ही पायवाट आपल्याला रामघळीकडे घेऊन जाते. ही समर्थांच्या साधनेची जागा आहे.
        या प्रवेशद्वाराचे नाव छत्रपती शिवाजी महाराज महाद्वार असे नामकरण करण्यात आलेले आहे. महाद्वाराच्या डावीकडे कातळ आणि उजवीकडे बुरूज आहे.हे द्वार आग्नेय दिशेस आहे.
        महाद्वारानंतर असलेल्या पायऱ्या चढून गेल्यानंतर किल्ल्याचे दुसरे प्रवेशद्वार आहे. या दरवाज्याला श्री समर्थ प्रवेशद्वार असे नाव देण्यात आलेले आहे. हा दरवाजा पहिल्या दरवाज्यापेक्षा प्रशस्त आहे.आजही हे दरवाजे रात्री दहा नंतर बंद होतात. 
      प्रवेशद्वाराच्या दर्शनी भागात असलेल्या तीन कमानी आणि कमानींच्या वर असलेल्या फार्सी भाषेतील शिलालेख यांच्यावरून या दरवाज्याची बांधणी शिवपूर्वकाळात झाली असावी असे वाटते. या दरवाज्यात असलेल्या देवड्यांचे (पहारेकरांच्या  खोल्या) छत घुमटाकार आहे. घुमटाकार छत हे मुस्लीम स्थापत्यशैलीचे वैशिष्ट्य आहे. 
   या प्रवेशद्वारातून  आत आल्यावर दोन देवड्या आहेत. त्यापैकी एका देवडीत श्रीधरस्वामींनी हनुमानाची स्थापना केली आहे.
किल्ल्याच्या दोन्ही दरवाज्यांच्या बाहेर पहारा देणाऱ्या पहारेकऱ्यांसाठी व्यवस्था केलेली आहे. तसेच किल्ल्याचा पहिला दरवाजा दुसऱ्या दरवाज्यातून माऱ्याच्या टप्प्यात आहे. किल्ल्याच्या इतर भागात तुटलेले कडे असल्यामुळे फक्त ह्याच भागातून शत्रू शिड्या किंवा माळांच्या सहाय्याने किल्ल्यात प्रवेश करू शकतो आणि त्यामुळे किल्ल्याच्या याच भागात तटबंदी जास्त मजबूत आहे.
      परळी किल्ल्यावरील इमारतीच्या दरवाज्याचा पाया ३ जनादिलाखर या तारखेस तयार झाला. आदिलशहा रेहान याने याचे काम केले. बांधकाम करणारा आदिलशाही रेहान कोण हे कळून येत नाही. कारण इतिहासात दुसऱ्या इब्राहीम आदिलशहापर्यंत कोणत्याही रेहानचा संदर्भ मिळत नाही.
   शिलालेखाच्या जवळच पण तटाच्या वरील बाजूस सिंह हत्तीवर मागील बाजूने हल्ला करीत आहे असे शिल्प आहे. हे शिल्प किल्ल्यावरील एखाद्या मंदिराचे असावे. 
       शिल्प पाहून पुढे गेल्यानंतर लोकमान्य टिळकांची स्मृती जतन व्हावी म्हणून बांधलेली लोकमान्य स्मृती कमान दृष्टीस पडते. कमानीच्या थोडे अलीकडे डाव्या बाजूला घोडाळे तळे आहे. या तळ्यातील पाण्याचा वापर जनावरांना पाणी पाजण्यासाठी केला जात असे. तळ्याच्या काठावर वीराचे स्थान आहे. तळ्याच्या काठावर चुना मळण्यासाठी तयार केलेला चुन्याचा घाणा आहे. 
     तळ्यावरून पुढे घेल्यानंतर भग्नावस्थेत असलेली मशीद आपल्याला दिसते. मशिदीच्या स्थापत्यकलेवरून ही मशीद बहामनी काळात बांधली असावे वाटते. भिंतीच्या बांधकामासाठी दगडी चिऱ्यांचा, तर छताच्या बांधकामासाठी विटांचा वापर करण्यात आलेला आहे.
     गडावरील मशिदीच्या समोरच्या बाजूस आंग्लाई देवीचे मंदिर आहे. समर्थाना अंगापूर डोहात दोन मूर्ती सापडल्या. यांपैकी सूर्यनारायणाच्या मूर्तीची त्यांनी चाफळ येथे श्रीराम मूर्ती म्हणून स्थापना केली व श्री आंग्लाई देवीच्या मूर्तीचीही स्थापना केली. शिवकाल व पेशवेकालीन ऐतिहासिक वारसा जपणारी आंग्लाई देवीचं स्थान हे अनेक घडामोडींचे साक्षीदार आहे.
         मशीदीच्या पूर्वेला आंग्लाईदेवीचे मंदिर आहे. आंग्लाईदेवीची मूर्ती समर्थांना अंगापूर गावातील डोहात सापडली. आंग्लाईदेवीच्या मूर्तीबरोबरच सापडलेल्या रामाच्या (मूर्तिशास्त्रानुसार सूर्य) मूर्तीची स्थापना चाफळ येथे करण्यात आली. देवीची मूर्ती चतुर्भुजा असून महिषासुरमर्दिनीरुपात आहे. मूर्तीच्या मागे पितळी महिरप असून कीर्तिमुख कोरलेले आहे. या मंदिराबाबत एक गोष्ट सांगितली जाते. समर्थांना आपल्या आईचा अंतकाळ जवळ आल्याचे त्यांच्या अंतर्ज्ञानाने कळल्यानंतर त्यांनी स्वतःला या मंदिरात कोंडून घेतले. तसेच विशिष्ट दिवशाच्या आधी हे मंदिर उघडू नये अशी सक्त ताकीद समर्थांनी शिष्यांना दिली. समर्थांच्या आज्ञेनुसार शिष्यांनी विशिष्ट दिवशी मंदिराचे दार उघडल्यानंतर समर्थ बाहेर आले, तेव्हा शिष्यांना समर्थांनी क्षौर केलेले दिसून आले. क्षौराचे स्पष्टीकरण देताना त्यांनी आईचा जांब येथे देहांत झाला व अंत्यविधी आटोपून येत असल्याचे सांगितले.
    मंदिरासमोर ध्वजस्तंभाचा बुरुज आहे. ह्या बुरुजावरून आजूबाजूच्या परिसराचे सुंदर दर्शन घडते. मंदिर परिसरातच तटबंदीचे अवशेष दिसून येतात. बऱ्याच ठिकाणी तटबंदी ढासळली आहे. मंदिराजवळ असलेल्या तटबंदीत एक बंदिस्त गुहा आहे. ह्या गुहेत मारुतीची मूर्ती आहे.
       आंग्लाईदेवीचे दर्शन घेऊन पुन्हा घोडाळे तळ्याजवळ असलेली फरसबंदी वाट ओलांडल्यानंतर समोरच उजव्या हातास चिरेबंदीने बांधलेले मुक्काम तळे दृष्टीक्षेपात पडते. या तळ्याच्याजवळ समर्थांच्या दोन मुसलमान शिष्यांच्या कबरी आहेत. कबरीच्या जवळून जाणारी वाट कल्याण स्वामींनी छाटीसाठी उडी मारली त्या ठिकाणी घेऊन जाते. ह्या ठिकाणी मारुतीची स्थापना केली आहे. ह्या ठिकाणाबद्दल अशी कथी सांगितली जाते की एकदा रामदासस्वामी व कल्याण स्वामी फिरावयास गेलेले असताना समर्थांची छाटी वाऱ्याने उडून कड्याखाली गेली. तेव्हा समर्थ म्हणाले, “कल्याणा छाटी उडाली बघ.” समर्थांचे बोल ऐकताच कल्याण स्वामींनी आपल्या जीवाची पर्वा न करता कड्यावरून उडी मारली आणि ती छाटी जमिनीवर पडण्यापूर्वीच हातात धरली. तसेच जिथे कल्याण स्वामींची खाली उडी पडली तेथे कल्याणस्वामी मंदिर आहे.
        कल्याणस्वामींच्या उडी मारलेल्या ठिकाणाला भेट दिल्यानंतर मुख्य वाटेने श्रीराम मंदिराकडे जाताना पेठेतील मारुती मंदिर आहे. हे मंदिर समर्थांच्या आधीपासून होते. या मारुती मंदिराच्या मागील बाजूस आहे सोनाळे तळे. या तळ्यातील पाण्याचा वापर पिण्यासाठी केला जातो. तळ्यात सातीआसरा ठिकाण आहे. या तळ्याच्या एका कोपऱ्यात प्राचीन लेणी आहेत. या लेणी तळ्याची साफसफाई करताना सन १९५२ मध्ये आढळल्या. तळ्यातील पाण्याची पातळी कमी झाल्यानंतर या लेणी नजरेस पडतात. शेंदूर लावलेला वीरगळ तळ्याच्या काठावर उभा करून ठेवलेला आहे. वीरगळावर पायदळ व घोडदळ यांच्यातील युध्दप्रसंग कोरून ठेवला आहे. पेठेतील  मारुती मंदिरासमोर श्रीधरकुटी आहे. सन १९१५ मध्ये श्रीधर स्वामींच्या शिष्यांनी या वास्तूची उभारणी केली आहे. या वास्तूत श्रीधर स्वामींनी अनेकदा वास्तव केलेले होते.
          श्रीधरकुटी बघून मुख्य फरसबंदीवाटेने पुढे गेल्यानंतर उंच जोत्यावर बांधलेला समर्थांचा मठ नजरेस पडतो. मठासमोरील फरसबंदीच्या कामासाठी श्री शंकर कृष्ण देव यांनी आर्थिक सहाय्य केले. समर्थांचा मुक्काम शिवकाळात याच मठात होता. हा मठ छत्रपती शिवाजीमहाराजांनी बांधला असून बांधकामासाठी २००० होन खर्च आला असे सांगितले जाते. 
       या मठात असलेल्या शेजघराचे रुपांतर संग्रहालयात करण्यात आले आहे. या शेजघरात पितळी खुरांचा पलंग आहे. या पलंगावर तंजावर मठाचे मेरुस्वामी यांनी समर्थांना प्रत्यक्ष पाहून काढलेले हस्तरेखांकित चित्र ठेवलेले आहे. पलंगाशेजारी असलेल्या स्टॅंडमध्ये एक कुबडी, गुप्ती, वेताची काठी व सोटा ठेवलेला आहे. कुबडी श्रीदत्तात्रयांनी दिलेली समर्थांना दिली आणि गुप्तीत फिरंगी तलवार असून ही तलवार छत्रपती शिवाजीमहाराजांनी ३६० होनांना विकत घेतलेली आहे असे सांगितले जाते. लाकडी सोटा हिमालय परिभ्रमणाच्या वेळी एका सिद्धी पुरुषाने (बहुधा मच्छिंद्रनाथ) समर्थांना दिला अशी आख्यायिका आहे. स्टॅंडच्या शेजारी दोन मोठे तांब्याचे हंडे आहेत. या हंड्यांच्या कावडीतून कल्याणस्वामी उरमोडी नदीचे पाणी समर्थांना आणून देत असत असे सांगितले जाते. येथेच समर्थांच्या नित्य वापरातील पाणी पिण्याचा लोटा, पीकदानी आणि विड्याच्या पानांचा डबा ठेवलेला आहे. मारुतीने समर्थांना प्रसाद म्हणून दिलेला हुर्मुजी रंगाचा फेटा व हिमालयातील थंडीचा त्रास होऊ नये म्हणून मारुतीने दिलेली वल्कलेही येथे ठेवलेली आहेत. शेजघरात अग्निकुंड व प्रतापमारुतीची पितळी मूर्तीसुध्दा आहे. येथे असलेल्या मातीच्या सिंहासनावर मुख्य मंदिरातील श्रीराम मूर्ती सुरुवातीला त्यावर ठेवल्या होत्या. समर्थांचे देहावसनही याच मठात झाले.
       समर्थ मठाच्या उत्तरेला श्रीराम मंदिर आहे. ज्या खड्ड्यात समर्थांवर अग्निसंस्कार झाले त्यावरच हे मंदिर उभारले आहे. सभामंडपाच्या प्रवेशद्वाराजवळ पूर्वाभिमुख गणेशमूर्ती आहे. ही मूर्ती दासबोधाच्या पहिल्या दशकातील दुसऱ्या समासात वर्णन केल्याप्रमाणे आहे. गणपतीच्या मागे श्रीरामाकडे तोंड असणारी पश्चिमाभिमुखी दासमारुतीची मूर्ती आहे. सभामंडप ओलांडून गाभाऱ्यात गेल्यानंतर तेथे असलेल्या श्रीराम-लक्ष्मण-सीता यांच्या मूर्ती डोळ्याचे पारणे फेडतात. व्यंकोजीराजे यांच्या निमंत्रणावरून समर्थ रामदास तंजावरला गेलेले असताना तेथे अरणीकर आडनावाच्या अंध कारागिराला दृष्टि देऊन त्याच्याकडून पंचधातूच्या श्रीराम, लक्ष्मण, सीता आणि मारुती यांच्या सुंदर मूर्ती करवून घेतल्या. या मूर्ती शके १६०३ माघ वद्य ६ म्हणजे समर्थनिर्वाणाच्या चार दिवस आधी गडावर आल्या. शेजघरात असलेल्या मातीच्या सिंहासनावर या मूर्तींची स्थापना झाली. श्रीरामाच्या मूर्तीजवळ स्वतंत्र प्रभावळीत दासमारुतीची मूर्ती आहे. या मुर्तीजवळ रामदास स्वामींची छोटी प्रतिमा ठेवलेली आहे. श्रीराममूर्तीच्या समोर पितळी कलमदान असून ते समर्थांचे वडील सूर्याजीपंत ठोसर यांचे आहे असे सांगितले जाते. मंदिराचा सागवानी सभामंडप श्री गोवर्धनदास गुजर यांनी बांधलेला आहे. मंदिराचे सर्व मुख्य कार्यक्रम या सभामंडपातच होतात.
      राममंदिराच्या खाली असलेल्या तळघरात समर्थांची समाधी आहे. ही समाधी कोणीही तयार केलेली नसून स्वयंभू समाधी आहे अशी मान्यता आहे. ज्या ठिकाणी समर्थांच्या देहावर अग्निसंस्कार केले, त्या ठिकाणी दुसऱ्या दिवशी ही समाधी निर्माण झाली आहे. समाधी काळ्या पाषाणाची असून आयताकार आहे. समर्थांचे निर्वाण झाले तेव्हा कल्याणस्वामी डोमगावी होते. गडावर आल्यानंतर त्यांना समर्थांच्या निर्वाणाची बातमी समजताच शोक केला आणि समाधीपाशी जाऊन एकवार दर्शनाचा आग्रह धरला. त्यावेळी समाधी दुभंगून समर्थांनी कल्याणस्वामींना दर्शन दिले. ती चीर आजही समाधीवर दिसून येते. समाधीच्या मागील बाजूस असलेल्या कोनाड्यात पितळी पेटीत चंदनाच्या पादुका आहेत. या पादुका समर्थांना दत्तगुरुनी करवीर क्षेत्री दिल्याचे सांगितले जाते. समाधी फक्त पूजेच्या वेळी (सकाळी ७.३० ते ८.४५) विनाआच्छादित असते. इतर वेळी वस्त्र आणि फुले यांनी आच्छादलेली असते. समाधी स्थानावर पितळी मेघडंबरी आहे.
      समर्थमठ व श्रीराममंदिर यांच्या सभोवती दगडी फरसबंदी पटांगण आहे. प्रदक्षिणा मार्गावर मंदिराच्या मागे असलेल्या ओवऱ्यांपैकी एका ओवरीत वेणाबाईंचे वृंदावन आहे. वेणाबाई यांनी शके १६०० चैत्र वद्य १४ रोजी समर्थ रामदास स्वामींच्या समोर देहत्याग केला.
      या वृंदावनावर मारुतीची मूर्ती आहे. समर्थांच्या स्त्रीशिष्यांपैकी फक्त वेणाबाई यांनाच उभ्याने कीर्तन करण्याची परवानगी होती. समर्थांनी मिरजेच्या मठाची व्यवस्था वेणाबाईंकडे सोपवली होती. वेणाबाईंनी उत्तम दर्जाच्या वाड्मयाची निर्मिती केली. तसेच एका ओवरीत मारुती आणि देवतांची स्थापना केली आहे. या वृंदावनाच्या जवळच असलेल्या भिंतीच्या कामासाठी एक वीरगळाचा वापर करण्यात आलेला आहे.
      समर्थ मठासमोर असलेल्या अशोकवनाच्या जागी पूर्वी एक तळे होते. याच अशोकवनात आक्काबाईंचा मठ आहे. या मठात अक्काबाई यांचे वृंदावन आहे. समर्थांच्या मृत्यूनंतर चाफळ व सज्जनगड येथील दोन्ही मठांची आणि मंदिरांची व्यवस्था अक्काबाई यांनी उत्तमरीत्या सांभाळली. या अशोकवनात अजून एक तुळशीवृंदावन आहे.
       मंदिर आणि मठ यांच्यामध्ये असलेल्या पश्चिम दिशेच्या दरवाज्याने बाहेर पडल्यावर दूरवर असलेले मारुती मंदिर नजरेस पडते. किल्ल्याच्या पश्चिम टोकाला असलेल्या बुरूजाजवळ हे मंदिर आहे. या मारुतीला धाब्याचा मारुती असे म्हणतात. या मारुतीची स्थापना रामदास स्वामी यांनी तटाच्या रक्षणार्थ केलेली आहे. मूळ छोटेखानी मंदिराच्या सभोवती नवीन सुंदर व प्रशस्त मंदिर, फरसबंदी आणि मंदिराच्या बाहेर विसाव्यासाठी कट्टे बांधलेले आहेत. एकांत आणि रामनामात वेळ घालवण्यासाठी ह्या मंदिरासारखी दुसरी जागा संपूर्ण गडावर नाही.
      धाब्याच्या मारुतीचे दर्शन घेऊन समाधीमंदिरावर परत येत असताना साधारणपणे मध्यावर तटाच्या कडेजवळ ब्रह्मपिसा स्थान आहे. येथे असलेल्या ओट्यावर हनुमानमूर्ती आहे. हे ठिकाण कल्याण स्वामींशी निगडीत आहे. कल्याण स्वामी हे समर्थांचे आवडते शिष्य आहेत ही गोष्ट काहीजणांना खटकत होती. त्यामुळे कल्याणस्वामींची योग्यता इतरांना पटवून देण्याचे समर्थांनी ठरवले. एकदा समर्थांनी सर्वांगाला शेंदूर फासला, मळवट भरून हातात तलवार घेऊन वेड लागल्याप्रमाणे शिष्यांच्या मागे धावत होते. कल्याण स्वामींना ही बातमी समजल्यावर लगोलग तिथे पोहोचले. कल्याण स्वामी येत आहेत हे बघून समर्थांनी तटावरून खाली उडी मारली आणि अवघड जागी बसले. समर्थांच्या पाठोपाठ कल्याण स्वामी देखील त्या अवघड जागी पोहोचले. तेव्हा समर्थ पळत जाऊन पायथ्याशी असलेल्या देवीच्या मंदिरात लपून बसले. तेथेही कल्याण स्वामी जाऊन पोहोचले. हे बघून समर्थ कल्याण स्वामींच्या धावून गेले. “महाराज ! खुशाल मारा. अशा मरणाने मोक्षच मिळेल. आपल्या या लीलेवरून आपणास वेडे म्हणणारे लोकच वेडे आहेत. ” असे उद्गार कल्याण स्वामींनी काढले. कल्याण स्वामींचे उद्गार ऐकताच समर्थांची परीक्षा संपली आणि कल्याण स्वामींचे श्रेष्ठत्व सिध्द झाले. ज्या जागेवरून समर्थांनी उडी मारली तेथे एक कट्टा तयार करून त्याच्यावर मारुतीची स्थापना करण्यात आली.असे सांगण्यात येते की, गडाच्या या पश्चिम बाजूस छत्रपती शिवाजी महाराज आणि समर्थ रामदासांची भेट होत असे. 
        धाब्याच्या मारुतीपासून ठोसेघर धबधब्याकडे जाणारा रस्ता दिसतो.सध्यस्थितीत सज्जनगडावर पडलेल्या अवस्थेतील तटबंदी आहेत आणि गड म्हणून काही भग्न अवस्थेतील अवशेष आहेत. परंतु समर्थ रामदास स्वामींच्या समाधी स्थळामुळे सज्जनगडास विशेष श्रद्धास्थान प्राप्त झाले आहे. रामदासी आणि समर्थ रामदासांना श्रद्धास्थान मानणारे भाविक गडावर नियमित येत असतात. तसेच राम नवमीला गडावर उत्सव असतो. त्यामुळे समर्थांच्या या भूमीवर आपण पर्यटक म्हणून अथवा भाविक म्हणून गेल्यानंतर गडाचे पावित्र्य जपणे गरजेचे आहे.गडावर राहण्यासाठी श्री समर्थ सेवा मंडळ कार्यालय तर्फे खोल्या उपलब्ध होतात. गडावर धर्मशाळा देखील आहेत. सज्जनगड सेवा मंडळाच्या खोल्याही राहण्यासाठी उपलब्ध होतात.
         किल्ल्यावर दासनवमी, रामनवमी, हनुमानजयंती, गुरुपोर्णिमा, श्रीवेणाबाई पुण्यतिथी, अक्काबाई पुण्यतिथी, गणेशोत्सव, विजयादशमी, श्रीधरस्वामी पुण्यतिथी इ. दिवस गडावर साजरे केले जातात. किल्ल्यावर संस्थानाची निवासव्यवस्था आणि प्रसाद-भोजन व्यवस्था उपलब्ध आहे. त्याचबरोबर अनेक उपहारगृहेसुध्दा उपलब्ध आहेत. किल्ल्याचे दरवाजे रात्री बंद करून पहाटे पुन्हा उघडले जातात.
        समर्थ रामदास आणि त्यांचे कार्य अनुभवायचे असेल तर तर सज्जनगडला भेट दिलीच पाहिजे.आजही गडावर समर्थकार्य अविरत सुरू आहे. पहाटेची काकडारती आणि त्यानंतर मिळणारा अमृततुल्य लोण्याचा प्रसाद, दुपारचे सहभोजन, सायंकाळची आरती, दासबोधाची पारायणं आणि त्यानंतर गडाच्या मागच्या बाजूला फक्त घोंघावणारा वारा आणि त्या एकांतात समाधानाने फिरणारे आपण ! खरंच पावसाळ्यात किंवा हिवाळ्यातच जायला पाहिजे असं नाहीच हे इथे आल्यानंतर क्षणोक्षणी जाणवतं. त्यामुळे उन्हाळ्यात तुम्हीही सज्जनगड पाहून याच ! याव्यतिरिक्त गडावर राहण्याची व जेवणाची उत्तम सोय होते. त्यामुळे अगदी खिशाला परवडेल अशा किंमतीत आणि समाधानात तुमची ही सफर पूर्ण होते व पुन्हा पुढच्या उन्हाळ्यात सज्जनगडला येणारच असं ठरवून आपण माघारी फिरतो.
         सज्जनगड परिसरात आल्यानंतर साताऱ्याहून ठोसेघर धबधबा, अजिंक्यतारा किल्ला आणि कास पठार ही ठिकाणे देखील जवळ आहेत. पर्यटक सज्जनगडावर आल्यानंतर यासर्व ठिकाणी जावून येवू शकतात.
|| जय जय रघुवीर समर्थ ||

जबरेश्वर मंदिर :-

    फलटण शहरात यादव काळात (इ.स.पू. १००० ते १४००) अनेक मंदिरे बांधली गेली. त्यापैकी एक प्राचीन "जबरेश्वर मंदिर" आजही राजवाडा व श्रीराम मंदिरा यांच्या जवळ रस्त्याच्या मधोमध उभे आहे. हे मंदिर हेमांडपंथी शैलीतील आहे.   
  फलटण शहरात यादव काळात (इ.स.पू. १००० ते १४००) अनेक मंदिरे बांधली गेली. त्यापैकी एक प्राचीन "जरबेश्वर मंदिर" आजही राजवाडा व श्रीराम मंदिरा यांच्या जवळ रस्त्याच्या मधोमध उभे आहे. हे मंदिर हेमांडपंथी शैलीतील आहे.   
    जबरेश्वर हे मूळचे जैन मंदिर असावे. तेथील चोवीस तीर्थकरांच्या मूर्ती व ललाटबिंबातील (गणेशपट्टीतील)  जिनाची मूर्ती हे स्पष्ट दर्शवितात. चौथे मुधोजीराव निंबाळकर (१८५३ - १९१६) यांनी जबरेश्वर मंदिरात  महादेवाच्या पिंडीची स्थापना केली. या उत्तराभिमुख मंदिरास गर्भगृह व प्रवेशमंडप असून तळ्याचे विधान 
चतुरस्त्र आहे. बाहेरील भिंतीवर शिल्पांकन आढळते. गर्भगृहात छताखाली पादपृष्ठावर चोवीस तीर्थकारांच्या मूर्ती खोदल्या आहेत. गर्भगृहाचे द्वार कलाकुसरयुक्त असून मंदिरातील मूर्तीत अष्टदिक्पाल व सुरसुंदरी यांच्या मूर्ती लक्षणीय आहेत. गाभार्‍यच्या प्रवेश व्दाराशेजारी पाच फण्यांची नागीण व तिचे दोन पिल्ले यांची मुर्ती आहे, 
तर उजव्या बाजूला कोनाडयात विठ्ठल-रुक्मीणी, नंदी, कासव, गणपती अशा मुर्ती आहेत. गाभार्‍यातील पिंड चौकोनी आकाराची असून तिचे तोंड पूर्वेकडे आहे. पिडीवर दोन शाळुंका आहेत. मंदिराच्या बाहेरच्या बाजूस असलेल्या मैथून शिल्पांची बरीच मोडतोड करण्यात आलेली आहे. श्रीराम मंदिराजवळ काही अंतरावर रस्त्याच्या मधोमध जबरेश्वराचे प्राचीन मंदिर आहे. हे हेमांडपंती शैलीतील  मंदिर असून, त्यावरील शिल्पाकृती व दगडावरील बारीक कलाकुसर आकर्षक आहे. हे मंदिर एकाच प्रचंड 
आकाराच्या शिळेमधून कोरून काढल्यासारखे वाटते. गाभाऱ्यातील पिंडी चौकोनी आकाराची असून, तिचे तोंड  पूर्वेकडे आहे. चौथे मुधोजीराव निंबाळकर (१८५३ - १९१६) यांनी जबरेश्वर मंदिरात महादेवाच्या पिंडीची स्थापना  केली. गर्भागृहात छताखाली २४ तीर्थंकरांच्या मूर्ती दिसून येतात. पिंडीवर दोन शाळुंका असून, त्यांचा आकारही  वेगळा आहे. अशा प्रकारची पिंडी सहसा कोठे आढळत नाही. गर्भागृहाचे द्वार अनेक शिल्पांनी मढविलेले असून, मंदिरातील मूर्तीमध्ये अष्टदिक्पाल व सुरसुंदरी यांच्या मूर्ती आहेत. गाभाऱ्याच्या प्रवेशद्वाराशेजारी पाच  फण्यांची नागीण व तिची दोन पिल्ले यांची मूर्ती आहे. उजव्या बाजूला कोनाड्यात विठ्ठल-रुक्मिणी, नंदी,
 कासव, गणपती अशा मूर्ती आहेत. येथील गोलाकार आकारातील सभागृह बंदिस्त आहे.
  फलटण हे भारतातील एक पुरातन शहर आहे. महानुभाव साहित्यात याचा ‘पालेठाण’ असा उल्लेख आढळतो. येथे महानुभाव पंथियांची अनेक मंदिरे असून फलटणला, महानुभाव पंथीयांची "दक्षिणकाशी" म्हणून ओळखले  जात असे. 
श्रीराम मंदिर : 
फलटणमधील श्रीराम मंदिर हे शहराचे भूषण आहे. हे मंदिर २२५ वर्षांपूर्वीचे आहे. मंदिराभोवती उंच दगडी भिंत आहे. भव्य प्रवेशद्वारातून आत प्रवेश केल्यावर डाव्या बाजूला राजवाडा, तर उजव्या बाजूला श्रीरामाचे मंदिर आहे. मंदिर पूर्वाभिमुख असून, मंदिरासमोर तीन दीपमाळा आहेत. गाभाऱ्यात श्रीराम, लक्ष्मण व सीता यांच्या नयनमनोहर मूर्ती आहेत. हे मंदिर हेमाडपंती शैलीतील असून, याचा शिखर व कळस अत्यंत प्रेक्षणीय आहे. श्रीराम मंदिराला लागूनच राधाकृष्ण, एकमुखी दत्त व गरुड यांची मंदिरे आहेत. त्याच्या उत्तरेला श्रीमंत मुधोजीराव नाईक-निंबाळकर यांनी बांधलेले दत्तात्रयाचे मंदिर आहे. फलटणमध्ये जैनधर्मीयांची वस्ती मोठी आहे. व्यापार-उदिमासोबत त्यांचा स्थानिक सामाजिक कार्यातही मोठा सहभाग असतो. त्यांची अनेक मंदिरे या गावाची शोभा वाढवीत आहेत.
श्री चक्रपाणि प्रभूंचे "श्री आबासाहेब मंदिर", फलटण)
    फलटण शहरातील हे मंदिर श्री अप्पासाहेब मंदिर या नावाने ओळखले जाते.या आशी हे रंभाइसा याचे मंदिर म्हणून ओळखले जात होते.रंभइसा हि श्री चक्रपाणी प्रभु यांची सावत्र आई आणि मावशी होती. चक्रपाणी प्रभु यांची आई जनकाइसा होत्या. चक्रपाणी एक वर्षाचे असताना रंभइसाने त्यांना आपल्या घरी आणले.चक्रपाणी प्रभु फलटणमध्ये दहा वर्ष राहीले.
   जुन्या मंदिराचे पुढे नुतनीकरण झाले.महानुभाव पंथाची जी सुंदर देवस्थान आहेत त्यापैकी एक हे फलटणचे मंदिर.हे मंदिर चक्रपाणी महाराजांचे चरणांकित स्थान मानले जाते.   
मुधोजी मनमोहन राजवाडा : 
    आज हा वाडा फलटणच्या वैभवाचा इतिहासाचा मानबिंदू ठरला आहे. सुमारे साडेतेरा एकर क्षेत्रफळाची (जवळजवळ सहा लाख स्क्वेअर फूट) ही भव्य वास्तू उत्तम स्थितीत उभी आहे. १६-१७व्या शतकातील मराठा शैलीतील जुनी व १८-१९व्या शतकातील ब्रिटिश शैलीतील नवी रचना अशी जोडवास्तू हे याचे वैशिष्ट्य आहे.
मुधोजी मनमोहन राजवाडा महात्मा गांधी स्मारक निधीला त्यांनी दानपत्र करून दिला; मात्र देखभालीचा खर्च झेपत नाही या सबबीवर महात्मा गांधी स्मारक निधीने मुधोजी मनमोहन राजवाडा परत केला. हा वसा त्यांनी नंतरही सुरू ठेवला. महाराजसाहेबांनी विनोबा भावे यांच्या भूदान यज्ञास एक हजार एकर जमीन दिली होती. त्यांच्या दातृत्वाची महती सांगणारी अशी अनेक उदाहरणे आहेत. एकदा कर्मवीर भाऊराव पाटील राजेसाहेबांना म्हणाले होते, ‘मी आज एक मुलगा तुमच्या ताब्यात देत आहे.’ हा मुलगा म्हणजे आपल्या अभ्यासपूर्ण ओघवत्या वाणीने श्रोत्यांना मंत्रमुग्ध करणारे प्राचार्य शिवाजीराव भोसले. त्यांची ही कर्मभूमी. अखेरपर्यंत ते मुधोजी महाविद्यालयात प्राचार्य होते. त्यानंतर ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरू झाले. रविकिरण मंडळाचे सदस्य कवी गिरीश हेही काही काळ फलटण येथे मुधोजी विद्यालयात अध्यापन करीत होते. फलटण मुक्कामात त्यांनी काही कवितांची रचना केली होती.
मुधोजी मनमोहन राजवाडा : आज हा वाडा फलटणच्या वैभवाचा इतिहासाचा मानबिंदू ठरला आहे. सुमारे साडेतेरा एकर क्षेत्रफळाची (जवळजवळ सहा लाख स्क्वेअर फूट) ही भव्य वास्तू उत्तम स्थितीत उभी आहे. १६-१७व्या शतकातील मराठा शैलीतील जुनी व १८-१९व्या शतकातील ब्रिटिश शैलीतील नवी रचना अशी जोडवास्तू हे याचे वैशिष्ट्य आहे. जुना भाग भारतीय वास्तुकलेचा व त्यातील लाकडी कलाकुसरीचा सुंदर नमुना आहे. सुंदर कडीपाट, नक्षीदार भक्कम दरवाजे, लाकडी तुळया व आधाराचे खांब अशा पद्धतीच्या वास्तू आता यापुढे निर्माण होणार नाहीत. राजवाड्यात निवासी, कार्यालयीन अशा प्रकारची वास्तुरचना यामध्ये करण्यात आली आहे. त्यानुसार जुन्या व नवीन आकर्षक फर्निचरने सजविलेले दिवाणखाने येथे आहेत. त्यांना ‘गुलाबी हॉल’, ‘हिरवा हॉल’, ‘बदामी हॉल’, ‘दरबार हॉल’, ‘सुरुच हॉल’, ‘हमखासे हॉल’ अशी सुंदर नावेही दिली आहेत. पॅलेस बांधताना खासगी वापराच्या खोल्या, त्यामध्ये, कोठी, मुदपाकखाना (किचन), देवघर, माजघर, व २४ शयनगृहे अशी रचना असून, संस्थानाच्या कामकाजासाठी कार्यालये, दरबार इत्यादी सर्व गोष्टी विचारात घेतल्या आहेत. उजेडासाठी व वारा खेळण्यासाठी अनेक चौकांची खुबीने रचना केलेली आहे. त्यामधे ‘रामाचा चौक’, समारंभासाठी ‘दसऱ्याचा चौक’, ‘देवीचा चौक’, ‘तुळशीचा चौक’, ‘मुदपाक चौक’, ‘पागा चौक’ व ‘नजरबाग’ असे चौक आहेत. त्याच्या बाजूने ओवऱ्या आहेत. सात खणी, चार खणी, गोल खणी असे खोल्यांचे विविध आकारही आहेत. वाड्याचा दर्शनी भागही खूप आकर्षक आहे. या ठिकाणी अनेक चित्रपटांचे चित्रीकरण झाले आहे व चालूही असते; मात्र हा वाडा इतर राजवाड्यांसारखा खुलेआम बघता येत नाही. फलटणच्या राजघराण्याच्या संग्रहात अनेक दुर्मीळ व्हिंटेज कार आहेत.
गिरवी ग्राम अर्थात दक्षिण वृन्दावन
    पुण्यातून फलटण साधारण ११० किमी. आणि फलटण पासून साधारण ८,१० किमी अंतरावर असलेले हे गिरवी गाव.गावातून जाणाऱ्या रस्त्याच्या उजव्या हाताला असलेले हे मंदिर.निरव शांतता, बाहेर मोठा वृक्ष,त्या वृक्षाखाली एक छोटे खोलीवजा मंदिर, ज्यामध्ये देवाकडे पाहत असलेली हनुमंत, नंदी आणि गरुडाची मूर्ती.
 मंदिराच्या मागे विहिर असून तिथे पादुका आहेत त्याचे प्रथम दर्शन घेतले जाते.इथे एक विशाल चिंचेचा वृक्ष आणि त्याच्या पायथ्याशी भरपूर पाणी असलेली विहीर.
त्या विहिरीपाशीच एक छोटेखानी मंडप घालून गिरिधराची मूर्ती साकारणाऱ्या मूर्तिकाराच्या पादुका स्थापित आहेत. 
      समोरच, सकृतदर्शनी एखादा चौसोपी, ऐसपैस वाडा वाटावा अश्या धाटणीचे, चिरेबंदी मंदिर. थोरल्या दरवाजाने आत शिरल्याशिरल्या डाव्या बाजूला एक छोटासा आड, समोर देवळाचे सभागृह आणि थेट गर्भगृह. श्रीकृष्णाची काळ्या शाळीग्रामात साकारलेली मूर्ती. हरि आणि हर, दोहोंना एकात पाहण्याची.खाली चौकोनी पिंड आणि त्यावर साकारलेली हरीची, बासरीवादन करणाऱ्या प्रभू श्रीकृष्णाची मूर्ती,त्याच्या बाजूला दोन गायी, श्रीकृष्णाचे बासरीवादनान ऐकण्यात मुग्ध झालेल्या. बघताक्षणी मनाला भावणारी.
ह्यामागची संक्षिप्त कथा अशी. 
      साधारण ७०० वर्षांपूर्वी गिरवी ह्या गावात श्रीकृष्णभक्त श्रीयुत. बाबुराव देशपांडे राहत होते. त्यांना कृष्णभेटीचा ध्यास लागून राहिला आणि त्याच ध्यासातून त्यांना समाधिस्थ अवस्थेत गोपालकृष्णाने अमुक अमुक ठिकाणी शाळीग्राम मिळेल असा  दृष्टांत दिला. श्रीयुत बाबुराव देशपान्डे यांनी दृष्टांत मिळाल्याप्रमाणे त्या ठिकाणी उत्खनन केले असता, ज्यावर श्रीविष्णूची चिन्हे होती असा हा, भलाथोरला शाळीग्राम प्राप्त तर झाला.
    पण पुढचा प्रश्न उद्भवला. त्यांना त्यांच्या मनातील मूर्ती साक्षात साकार करू शकेल असा मूर्तिकार मिळेना. त्यांनी परत गोपाळकृष्णाचा धावा केला.काही दिवसांनी जय-विजय नावाचे दोन मूर्तिकार श्रीयुत देशपांडे यांना येऊन भेटले आणि तुमच्या मनातील मूर्ती बनवून देतो असा दावा केला.पण देवच तो, भक्ताची परीक्षा घ्यायची म्हणून का काय माहित नाही पण ह्या दोन्ही मूर्तिकारापैकी एक थोटा आणि दुसरा आंधळा.दैवी संकेत होताच, होकार देणे हा फक्त उपचार. त्यांना मदत म्हणून श्रीयुत देशपांडे यांनी त्यांच्या दिमतीला म्हणून काही मदतनीस देऊ केले, पण त्या दोघांनी एकांतात काम करण्याची अट कबुल करवून घेतले. पुढील काही दिवस अविश्रांत मेहनत करून साकारलेली मूर्ती बाबुराव महाराजांसमोर ठेवली. देवाची करणी आणि नारळात पाणी म्हणतात ना?मनातील मूर्ती मूर्त स्वरूपात समोर पाहून श्रीयुत बाबुराव याना अतिव आनंद झाला.
      मूर्ती ४ फुटाची, गोपालकृष्ण एका पायावर उभा, दुसऱ्या पायाची आढी घालून तो केवळ अंगठ्यावर टेकविलेला. मूर्तीला कुठेही जोड नाही.मूर्ती सालंकृत, सगळे अलंकार ठसठशीत.दोन्ही हातांची बोटे कोरलेली, त्यामध्ये फक्त लाकडी मुरली ठेवायची. इतके बारीक काम कि तळहातावरील रेषाही स्पष्ट दिसाव्यात.पायाशी दोन्ही गायी तल्लीन होऊन श्रीमुखावलोकन करताना.दर्शनी पट्टीवर चार मानवी आकृती आहेत, त्यामधील दोन ह्या मूर्तिकारांच्या आणि उर्वरित दोन भगवंताचे द्वारपाल जय-विजय यांच्या ह्या मूर्तीचे वैशिष्ट्य म्हणजे खुद्द ईश्वरालाही अभिप्रेत असलेला हरी-हर, हा एकात्मतेचा अविष्कार- हा गोपालकृष्ण चौकोनी शिवलिंगाकारावर- शाळुंका स्वरूपावर- साकारलेला आहे. इतका लोभस बारकाव्यासहित कि थेट श्रीमद भागवतात उल्लेखलेल्या युगंधराची हुबेहूब प्रतिमा दगडावर चितारल्याचा भास व्हावा.
त्यासाठीच बाहेर हनुमंत, गरुड आणि नंदीही विराजमान आहेत.
     मूर्ती पूर्ण झाल्यावर श्रीयुत बाबुराव यांनी मूर्तिकाराला सन्मानाने जेवणाचे आमंत्रण दिले. तेव्हा दोन्ही मूर्तिकार पाय धुवून येतो म्हणून मागील विहिरीवर गेले ते तिथेच अंतर्धान पावले.भक्ताचे लाड पुरवायचे, भाविकांना दर्शन द्यायची अनंताची इच्छा म्हणून आलेलेअनंताचे दूत, अनंताला घडविणारे अनंत,कार्य झाल्यावर अनंतात अंतर्धान पावले.त्यांची खूण म्हणून त्या विहिरीवर घडवून घेतलेल्या पादुका ह्या नजीकच्या काळातील आहेत. ह्या पादुका स्थापित करण्यामागे श्री जयंतकाका यांना दृष्टांतरुपी प्रेरणा आहे. जणूकाही तो युगंधर त्याला गीतेत अभिप्रेत असलेला ज्ञानयोग आणि कर्मयोग ह्या प्रसंगातून साकारलेल्या मूर्त रूपाने पुनःश्च सांगायला इथे उभा ठाकला आहे, प्रश्न आहे तो फक्त आपण अंत:र्मुख होऊन जाणून घेण्याचा.जे कोणी सत्पुरुष येथे येऊन गेले, त्यांच्या अनुभूतीप्रमाणे भगवंत त्यांच्या एका जिवलग भक्त- श्री. बाबुराव- यांच्यासाठी - इथे गहाण रुपी राहिला आहे, म्हणून या स्थानाचे नाव गिरवी, जणू नामाघरी पाणी वाहणारा श्रीखंड्या
    मोह आवरत नाही म्हणून एक दाखला द्यावासा वाटतो तो महाभारतातील दुर्योधनाच्या आणि अर्जुनाच्या मानसिकतेतील स्पष्ट फरकाचा,साक्षात ईश्वर सामोपचाराच्या गोष्टी करायला आलेला पाहूनही दुर्योधनाचा अहंभाव त्याच्या मुखी वदतो,
जानामि धर्मं न च मे प्रवृत्ति: 
जानाम्यधर्मं न च मे निवृत्ति:
आणि दुसरीकडे पराक्रमी तरीही गोंधळलेल्या अवस्थेतील अर्जुन अनन्यभावाने श्रीकृष्णाला शरण जातो.दुर्योधना त्याच्या समस्येचे फक्त प्रतिपादन करूनच थांबला नाही तर त्याच्या समस्येचे समर्थनही करता झाला. समस्या तर किंकर्तव्यमूढ झालेल्या अर्जुनाला पण होती. पण तो त्याच्या मनातील समस्या भगवंताला फक्त सांगून थांबला नाही तर त्या समस्येचे निराकरण करण्याचे साकडे हि भगवंताला घालून रिकामा झाला.आपण कोण ते आपण ठरवायचे आहे. तो भगवंत सगळ्यांनाच द्यायला उभा ठाकलाय, प्रश्न एवढाच कि आपला वाडगा सरळ आहे का पालथा?
   श्रीयुत बाबुराव यांनी मूर्तीची साग्रसंगीत प्राणप्रतिष्ठा करून मंदिराची सेवा योग्य त्या माणसाला सोपवून ह्या गोपाळकृष्णाच्या पायी समाधी घेऊन आपले जीवितकार्य संपविले. हि समाधी गर्भगृहाच्या खालील तळघरात आहे. ह्या तळघरात काही वेळ विसावलो, एका अनामिक शांततेचा लाभ घेतला. मंदिराच्या उत्तरेस असलेल्या गणपतीच्या दर्शनाचा लाभ घेतला. पुजार्यांनी सांगितल्याप्रमाणे हे स्थानही जागृत आहे.
    मंदिरात साधारण ७५ एक साधकांची सत्संग/साधना होऊ शकेल असा आटोपशीर हॉल आहे, मागेच स्वच्छतागृह आणि पाणी गरम करण्याची सोयही आहे. 

 धावडशी :-

  श्रीब्रह्मेंद्रस्वामी धावडशीकर हे उपेक्षित कर्मयोगी होते. शाहू छत्रपती, पेशवे, कान्होजी आंग्रे आणि अगदी जंजिरेकर सिद्दीचेसुद्धा गुरू असलेले ब्रम्‍हेंद्रस्वामी हे एक विलक्षण व्यक्तिमत्त्व होते. सन १६४९ साली विदर्भातील राजूरजवळ असलेल्या दुधेवाडीला त्यांचा जन्म झाला. काशीचे श्री ज्ञानेंद्रसरस्वतीनायक यांनी त्यांना परमहंस दीक्षा दिली. तेव्हापासून ते ब्रह्मेंद्रद्रस्वामी म्हणून ओळखले जाऊ लागले. इ.स. १६९८ साली ते कोकणातील परशुरामक्षेत्री वास्तव्याला आले.  कान्होजी आंग्रे आणि बाळाजी विश्वनाथ हे त्यांचे निस्सीम भक्त होते. ताराबाई-शाहू कलहात शाहूंच्या पाठीशी या दोघांनाही उभे करण्यात ब्रह्मेंद्रस्वामींचे मोठेच योगदान होते. छत्रपती, पेशवे, त्यांचे सरदार अशा अनेक मातब्बर व्यक्तींचे गुरू असलेल्या ब्रह्मेंद्रस्वामींचे राजकारणातसुद्धा चांगलेच वजन होते. त्यांनी उच्चारलेले शब्द खरे होतात अशी त्यांची कीर्ती होती. त्यांचे प्रस्थ एवढे होते की एकदा जंजिरेकर सिद्दय़ाचा एक सरदार सिद्दी सात याने चिपळूणच्या परशुराम क्षेत्राची नासधूस केली. स्वामींनी त्याचा लढाईत नायनाट होईल असा शाप दिला. जंजिरेकर सिद्दी स्वामींचा भक्त होता. आपल्या सरदाराची चूक त्याला समजली आणि त्याने लुटीची रक्कम तर परत केलीच शिवाय नुकसानभरपाई म्हणून चिपळूणचे परशुराम मंदिर पुन्हा बांधून दिले. पुढे चारच वर्षांनी मराठय़ांशी झालेल्या लढाईत सिद्दी सात मारला गेला. या प्रसंगाने उद्विग्न झालेले स्वामी सातारा या छत्रपतींच्या राजधानीच्या अगदी जवळ असलेल्या धावडशी गावी येऊन स्थायिक झाले. सन १७४५ मध्ये वीरमाडे या गावी ब्रह्मेंद्रस्वामींचे निधन झाले.श्रीब्रह्मेंद्रस्वामी हे छत्रपती शाहू महाराजांचे परम दैवत! त्‍यामुळे त्यांच्या मार्गदर्शनाखाली एक लाख रुपये खर्चून धावडशी गावातील स्वामींच्या समाधिस्थानावर त्यांचे मंदिर उभारण्यात आले आहे.त्यालाच लागून चार बांधीव तलाव आहेत. त्यांचा काळही अडीचशे-तीनशे वर्षांचा असल्याचं सांगितलं जातं. तीन मोठ्या आकाराचे, तर चौथा लहान, हौदासारखा. हे चारही तलाव एका साखळीसारखे एकमेकांना जोडलेले आहेत. प्रत्येक तलावाचा पाण्याचा वापर ठरलेला. सर्वांत वरचा तलावाचं पाणी देवाशी संबंधित स्वयंपाकासाठी, पुढच्या तलावाचं पिण्यासाठी, मग अंघोळीसाठी, शेवटी कपडे धुण्यासाठी. त्यानंतर हे पाणी ओढ्यात जातं आणि शेतीसाठी वापरलं जातं.या तलावांची गंमत म्हणजे इथलं पाणी एकाच दिशेनं वाहतं- पहिल्या तलावाचं दुसऱ्यात, दुसऱ्याचं तिसऱ्यात.
      परशुरामाचे निस्सीम भक्त असलेल्या या स्वामींनी धावडशीला दोन लाख रुपये खर्चून भार्गवराम मंदिर उभारले आहे. खास मराठा स्थापत्यशैलीचे धावडशीचे भार्गवराम मंदिर मोठे पाहण्यासारखे आहे.  जनावरे आणि माणसांसाठी पाण्याची स्वतंत्र केलेली सोय आवर्जून पाहावी अशी आहे. मंदिरावरील मूíतकाम सुंदर आहेच, पण त्यातही विष्णूचे दशावतार खास पाहण्याजोगे आहेत. मंदिरात परशुरामाची सुंदर मूर्ती असून एक शिलालेखही पाहायला मिळतो. 
      मंदिराची रचना आणि बांधकाम सुरेख व रेखीव आहे. मंदिराच्या महाद्वाराच्या शिरोभागी श्रीब्रह्मेंद्रस्वामींचे गुणगान गाणारा सतरा ओळींचा शिलालेख आहे. मंदिर उत्तराभिमुख असून, त्याचे प्रशस्त असे तीन गाभारे आहेत आणि पुढे, भव्य असा सभामंडप आहे. मुख्य मंदिर घडीव अशा दगडी उंच चौथऱ्यावर उभारलेले आहे. दगडांच्या सांध्यामध्ये शिशाचा वापर करण्यात आला आहे. मंदिरावर दोन गगनचुंबी शिखरे आहेत. त्यावर दोन उंच कळस आहेत. मंदिरावर सर्व बाजूंनी रेखीव पद्धतीने दशावतार कोरलेले असून, शिखरावर ठिकठिकाणी वेलपत्री नक्षिकाम व पौराणिक रंगीत चित्रे साकारलेली आहेत. त्या चित्रांवरील भावमुद्रा, वेचक प्रसंग व उत्कृष्ट रंगसंगती यांत शिल्पकारांचे व कलाकारांचे कौशल्य दिसून येते. मंदिराच्या पुढील शिखरावर चौकोनी आकाराचे आकर्षक मनोरे आहेत. त्यांच्या रचनेतील विविधता, कल्पकता व प्रमाणबद्धता -त्यांतील हस्तलाघव उल्लेखनीय आहे. मंदिराचा आधुनिक काळात जीर्णोद्धार करण्यात आला. त्यायोगे मंदिराच्या शोभेत भर पडली आहे.
     स्वामींचे उपास्य दैवत - श्री परशुराम तथा भार्गवराम. त्यांची काळ्याभोर पाषाणाची रेखीव मूर्ती मंदिराच्या मुख्य गाभाऱ्यात आहे. पेशवाईतील प्रख्यात कारागीर बखतराम यांनी ती मूर्ती घडवली असून तो शिल्पकलेचा उत्कृष्ट नमुना आहे. श्री भार्गवरामाच्या दोन्ही बाजूंस त्यांचे बंधू काळ व काम यांच्या साडेतीन फूट उंचीच्या पितळेच्या सुबक मूर्ती आहेत. त्या मूर्तींना उत्सवमूर्ती असे संबोधतात. मूर्तींसमोर श्रीब्रह्मेंद्रस्वामींची समाधी आहे. श्री भार्गवरामांजवळ दोन टांगत्या समया असून, समाधीजवळ उंच अशा पितळेच्या दोन घाटदार समया आहेत. परिमल, अखंड नंदादीप आणि पूजोपचार यांमुळे गाभारा शांत, निर्मळ, सुगंधी व शुचिर्भूत भासतो. मुख्य गाभारा प्रशस्त असून, त्याच्या प्रवेशद्वारावर उत्तम शिल्पाकृती दगडात कोरलेल्या आहेत. उजेडासाठी दोन्ही बाजूंला दगडात कोरलेल्या जाळ्या आहेत.
     गाभाऱ्याच्या उजव्या बाजूला उत्तराभिमुखी, पेशव्यांनी बसवलेली शेंदरी रंगाची सर्वांगसुंदर अशी गणेश मूर्ती आहे. डाव्या बाजूला उत्तराभिमुखी अष्टभुजादेवीची चित्तवेधक मूर्ती आहे. गाभाऱ्याच्या मध्यभागी दगडात कोरलेले मोठे कासव आहे. ते धावडशीकरांचे न्यायपीठ आहे. खरेखोटे करण्यासाठी त्या कासवावर उभे राहून श्री स्वामींची शपथ घेण्याची प्रथा आहे. गुन्हेगार अशी शपथ घ्यायला धजावत नाही. दालनाच्या दक्षिण बाजूस औंध संस्थानाचे राजे श्रीमंत बाळासाहेब पंत प्रतिनिधी यांनी भेट दिलेला संगमरवरी दगडातील कलात्मक शिल्प असलेला अडीच फूट उंचीचा आकर्षक पुतळा आहे. दालनाच्या वरभागी आरतीच्या वेळी वाजवले जाणारे दोन मोठे नगारे व मधुर नाद उत्पन्न करणाऱ्या घंटा आहेत. श्रींची आरती भक्तगणांना मंत्रमुग्ध करते तर सुरेल सनईचौघडा साक्षात नादब्रह्माचा आनंद देतो.
    मुख्य मंदिराच्या पुढील बाजूस भव्य सभामंडप असून, त्याचे बांधकाम लाकडी कलाकुसरीचे आहे. शंभर वर्षांपूर्वी मंडपाचे बांधकाम झाले असून, ते उत्तम स्थितीत आहे. लाकडे गलथे आणि महिरपी यांनी सभामंडपास शोभा आलेली आहे. मंडपास कडीपाट असल्याने सभामंडप शांत व शीतल बनलेला आहे. उजेडासाठी ठिकठिकाणी जाळ्या व मोठमोठे दरवाजे आहेत. सभामंडपातच मुख्य मंदिराच्या प्रवेशद्वारावर श्रीब्रह्मेंद्रस्वामींचा मोठा फोटो आहे. शेजारी छत्रपती शाहू महाराज व राणी लक्ष्मीबाई यांची मनोवेधक सुंदर चित्रे आहेत. तसेच, सभामंडपात अनेक संत सत्पुरुषांच्या तसबिरी लावल्या आहेत. सभामंडप हंड्या व झुंबरे यांनी सुशोभित आहे.
    मंडपाच्या पूर्व बाजूंस तळघरवजा दगडी भुयार असून, त्यात शिवलिंग व नंदी अशी दोन दैवते आहेत. शेजारीच, कोपऱ्यात लहानसे जलकुंड असून, भुयारात अतिशय थंड वाटते. सर्वत्र दगडी फरशी आहे. भुयाराची खोली एवढी आहे, की शेजारी खोल असलेल्या तळ्यातील पाणी जलकुंडात येते व त्यानेच शिवलिंगास स्नान घडते. ते भुयार म्हणजे स्वामींची स्नानसंध्या! ध्यानधारणा व पूजाअर्चा यांनी मंगलमय बनलेले पवित्र असे ते शिवमंदिर होय. भुयारात उजेड येण्यासाठी पूर्व बाजूंस मोठी जाळी असून, त्यातून तळ्यातील निळ्याभोर पाण्याचे दर्शन होते. भुयारात जाण्यासाठी पायऱ्या आहेत.
    भार्गव मंदिराचे सर्व आवार दगडी फरशीयुक्त असून, शेजारी पुष्पवाटिका, वृंदावने व सुबक दगडी बांधकामातील सुंदर अशी चार तळी आहेत. त्यांपैकी शिवमंदिरास लागून तीर्थाचे तळे आहे. तळ्यातील सुंदर निळेभोर पाणी व सुरेख, रेखीव तळ्याचे दगडी बांधकाम मनाला आनंद देते. तळ्यास लागून पूर्व बाजूस प्रशस्त उमाउद्यान आहे. तेथे विविधोपयोगी अशी सुंदर वास्तू उभी आहे. त्यास लागून ग्रामदैवत श्री वाघजाई देवीचे श्रीस्वामींनी बांधलेले नमुनेदार मंदिर आहे.
   मंदिराच्या परिसरात जुन्या ऐतिहासिक कागदपत्रांची व देवस्थानाची कचेरी आहे. त्या ठिकाणी जवळपास तीनशे वर्षांतील जुनी कागदपत्रे जतन करून ठेवण्यात आली आहेत. कचेरीस लागून मोठे स्वयंपाकगृह असून, हजारोंच्या पंक्ती उठतील अशी मोठमोठी भांडीकुंडी व सर्व सोयी आहेत. समोर भलेमोठे बांधकाम असलेली धर्मशाळा व सुसज्ज असे अतिथिगृह आहे. त्याच धर्मशाळेत उत्सवातील प्रसादपंक्ती होत असत. गावभोजन, विविध कार्यक्रम, सभासंमेलने यांसाठीही धर्मशाळेचा उपयोग होत असे. स्वामींचे स्मारक व पुण्यस्मरण म्हणून त्या वास्तूत ‘श्री ब्रह्मेंद्रस्वामी हायस्कूल’ सुरू करण्यात आले आहे. जणू काही तो परिसर विद्येचे माहेरघर बनू पाहत आहे.
     श्रीब्रह्मेंद्रस्वामी म्हणजे धावडशीकरांचे आराध्य दैवत. श्रावण शुद्ध नवमी ही स्वामींची पुण्यतिथी. श्रावण शुद्ध प्रतिपदा ते श्रावण शुद्ध नवमी असा नऊ दिवस स्वामींचा मोठा उत्सव साजरा होत असतो. कथाकीर्तने व टाळमृदुंग यांनी परिसर दुमदुमून जातो. गाव आनंदाने व उत्साहाने फुलून जातो. बाहेरून खूप लोक उत्सवासाठी येत असतात. गुळांमपोळी (गुळांबा पोळी) हे त्या भोजनातील वैशिष्ट्य आहे.   
    धावडशी हे एक निसर्गरम्य तीर्थक्षेत्र, पाठीशी नयनरम्य मेरुलिंगाची पर्वतराजी, उदात्त असे भव्य भार्गवमंदिर आणि शांत, प्रसन्न, पवित्र असे वातावरण. श्रींचे दर्शन व प्रसाद यांमुळे तेथे येणारा प्रत्येक भाविक भरून पावतो. त्याचे मन आनंदाने फुलून जाते. तेथे सत्पुरुषांच्या व लोकोत्तर देवेश्वरांच्या मठातील अद्भुत आध्यात्मिक प्रचंड शक्तीचा साक्षात्कार होतो आणि स्वामी या तीर्थक्षेत्रात विशेष रुपाने वास करत असल्याचा प्रत्यय येतो.
    स्वामी असती भगवंत | तयासी असे दंडवत ||
    घेईल दर्शन जो जो | तोचि एक भाग्यवंत ||
 झाशीची राणी लक्ष्मीबाई हिचे माहेरचे गाव म्हणजे हेच धावडशी होय. सातारा-वर्ये मार्गे धावडशी हे अंतर जेमतेम २५ कि.मी. इतके भरते. गावच्याच मागे मेरुलिंग नावाचा डोंगर असून त्यावर असलेले मंदिर, कोरीव खांब आणि मंदिरासमोरील कुंड बघण्यासारखे आहे. इथून सातारा, अजिंक्यतारा किल्ला, वेण्णा नदी, मेढा, यवतेश्वर, सज्जनगड, चंदन-वंदन किल्ले, जरंडेश्वर असा सारा परिसर अतिशय रमणीय दिसतो.श्रीब्रह्मेंद्रस्वामी धावडशीकर हे महाराष्ट्रायतील जनतेच्या विस्मृतीत गेलेले संत. पण त्यांचे कार्य आणि त्यांचे निस्सीम भक्त यांनी त्यांचे अस्तित्त्व टिकवून ठेवले आहे.

वसंतगड

      ज्वाजल्य संघर्षाचा इतिहास असणार्‍या महाराष्ट्रात अनेक गड शुर योध्यांनी केलेल्या बलिदानामुळे किंवा पराक्रमामुळे ओळखले जातात.उदा. सिंहगड हे नाव डोळ्यासमोर आले कि तानाजीची वीरगाथा आठवणारच, पुरंदर म्हणाले कि आपसुक मुरारबाजीचे नाव पुढे येणार्,अवघ्या साठ मावळ्यानिशी प्रचंड मोठा गड घेतलेला कोंडाजी फर्जंद आणि पन्हाळा हे अद्वैत्,विशाळगड आणि बाजीप्रभुंचे बलिदान हे न विसरण्याजोगे,नाशिक जिल्ह्यातील कण्हेरागड एरवी दुर्लक्षित राहिला असता,पण रामजी पांगेरामुळे तो इतिहासात सुवर्णाक्षराने नोंदला गेला.पण एक गड कदाचित पायथ्याच्या गावात जन्म घेतलेल्या वीरामुळे प्रकाशझोतात आला.ते शुर योध्दे म्हणजे सरसेनापती हंबीरराव मोहिते आणि तो गड म्हणजे अर्थातच वसंतगड.
इतिहास
 या गडाला प्रत्येक कालखंडात इतिहासाचे संदर्भ आहेत.वसंतगडाचे मुळ नाव चंद्रगिरी पर्वत असून त्याचा संदर्भ थेट रामायणाशी जोडला जातो. यासंदर्भात एक कथा सांगितली जाते, ती अशी.शुर्पणखेचा मुलगा शांभरी.आई शुर्पणखेचे नाक लक्ष्मणाने कापले, म्हणून त्याचा सुड उगवण्यासाठी त्याने या पर्वतावर ईंद्राची उपासना सुरु केली.ईंद्र प्रसन्न झाला कि त्याचे वज्र हे अस्त्र मागून त्याने राम-लक्ष्मण यांच्यावर वापर करुन शुर्पणखेच्या अपमानाचा बदला घेण्याची त्याची इच्छा होती.त्याने एका जागी बसून तप आरंभल्यावर त्याच्या भोवती वेळूचे दाट बन तयार झाले.झाडीझुडुपात शांभरी लुप्त झाला.एके दिवशी ईंद्र प्रसन्न होउन त्याने आपले अस्त्र शांभरीसाठी या पर्वतावर सोडले.योगायोगाने त्याच वेळी लक्ष्मण फिरत फिरत या पर्वतावर आले.नेमके त्यांनी वज्र या वेळूच्या बनात पडताना बघीतले. त्यांनी वज्र उचलून सहज म्हणून वेळूच्या बनावर चालवले,त्यामुळे आत तपश्चर्या करणार्‍या शांभरीचे हातपाय कापले गेले.त्या अवस्थेत शांभरी बाहेर आल्यावर लक्ष्मणांना पश्चाताप झाला आणि त्यांनी शांभरीला वर दिला कि 'लोक तुला चंद्रसेन म्हणून ओळखतील इथे येणारे भाविक देव म्हणून तुझी पुजा करतील आणि हा पर्वत तुझ्या नाबाने म्हणजे चंद्रगिरी डोंगर म्हणून ओळखला जाईल.' आजही या डोंगरला चंद्रगिरी म्हणतात आणि गडावर आपण चंद्रसेनाचे मंदिर आपण बघु शकतो. 
      वसंतगडाची निर्मिती भोज शिलाहार राजाने केली.  शिवपूर्वकाळात अनेक शतके यवनसत्तेच्या अमलाखाली होता. मसूर परगण्याचे पूर्वांपार जहागीरदार महादजी जगदाळे हे विजापूरच्या आदिलशाहीच्या सेवेत होते. हा किल्ला आदिलशाहीत असलेल्या सरदार जगदाळे यांच्या ताब्यात होता. या भागाचा सर्व कारभार याच किल्ल्यावरून होत होता. अशावेळी ह्या भल्यामोठ्या वाड्याचे अवशेष बहुधा जगदाळे यांच्याच वाड्याचे असावेत मात्र सबळ असा कोणताही पुरावा मिळत नाही.
      हा किल्ला अफजलखान मोहिमेपर्यंत आदिलशाहीच्या सेवेत असलेल्या मसूरच्या सरदार जगदाळे यांच्या ताब्यात होता, कारण अफजलखानाच्या बाजूने जगदाळे हे छत्रपतींच्या विरोधातील लढाईत सामील झाले होते. १० नोव्हेंबर १६५९ ला अफजलखान मारला गेला आणि विजापूरच्या सैन्याची दाणादाण उडाली. अर्थात महाराजांना विरोध करणं त्यांना भागच पडलं. महादाजी जगदाळे हे तर शाही नोकर म्हणून अफझलखानाच्या सांगाती प्रतापगडच्या आखाड्यात उतरले. छत्रपतींनी प्रतापगडाच्या पायथ्याशी खानाचा कोथळा बाहेर काढून आदिलशाहीस मोठा दणका दिला होता. अनपेक्षित  पराभवाने गांगरलेल्या आदिलशाहीतील कोल्हापूरपर्यंतचा सर्व मुलूख व किल्ले घेण्यासाठी छत्रपतींनी लगेचच मोहिम आखली. खान संपला. शाही फौजेची दाणादाण उडाली. त्यात महादजी जगदाळे तळबीड गावाजवळ महाराजांचे हाती जिता गवसला. महाराजांनी त्याचे हात तोडले आणि वसंतगड स्वराज्यात घेतला.शत्रूच्या गोटात सामील होऊन स्वराज्य द्रोह करणाऱ्या जगदाळेला मृत्यूदंडाची शिक्षा मिळाली.याच महादाजीला आठदहा वर्षाचा पोरगा होता. जिजाऊसाहेबांनी अगदी आजीच्या मायेनं या पोराला आपल्यापाशी सांभाळला. त्याला शहाणा केला. तो स्वराज्याचाच झाला.
  पुढे शिवाजी महाराजांचा मिर्झाराजे जयसिंगांशी संघर्ष झाला आणि पुरंदरचा तह झाला,त्यामध्ये शिवाजी राजांना मोघलांना तेवीस किल्ले देणे भाग पडले,त्यात या वसंतगडाचा समावेश होता.वास्तविक सिद्दी जोहरच्या वेढयातून महाराजांची सुटका झाल्यावर त्यांनी जिंकलेला आदिलशाही मुलुख परत दिला, तरीही हा वसंतगड शिवाजी महाराजांकडे कसा राहिला हे समजत नाही. त्यानंतर इ. स. १६७० मधे स्वराज्याच्या मावळ्यांनी हा परत घेतला. छ. संभाजी महाराजांच्या दुर्दैवी अंतानंतर काहीशी अनागोंदी झाल्याने स्वराज्यातील बहुतेक किल्ले मोगलांच्या ताब्यात गेले त्यात वसंतगड देखील होता.  छ. राजाराम महाराज जिंजीला असताना मराठी सरदारांनी पुन्हा त्याला स्वराज्यात सामील केले असणार कारण जुलै १६९९ ला दातेगड जिंकून सेनापति धनाजी जाधव व शंकराजी नारायण सचिव हे राजाराम महाराज व ताराबाईसाहेब यांच्या भेटीसाठी वसंतगडला गेले होते.  पुढे जिंजीहून परत आल्यानंतर छत्रपती राजाराम महाराज काही दिवस वसंतगडावर मुक्कामास होते. इथच वर्हाडातील राजा बुलंदबख्त याच्या वकीलाशी त्यांची भेट होउन वर्‍हाड्,खानदेशातील संयुक्त मोहीमेचा बेत ठरला.त्याच वर्षी लुत्फुल्लाखानाने वसंतगडला वेढा घालण्याचा असफल प्रयत्न केला होता. मात्र मोगल बादशाह औरंगजेब कराड मुक्कामी राहून वसंतगडा वेढा घालून किल्ल्याची रसद तोडण्यासाठी परिसरातील वाड्या जाळून टाकल्या होत्या. अखेर रसद तुटलेल्या किल्लेदाराने किल्ला मोगलांच्या हवाली केले व मराठ्यांची होणारी कत्तल थांबवली. हा जिंकलेला किल्ला पाहण्यासाठी स्वतः औरंगजेब किल्ल्याच्या दरवाजात जेव्हा पोहोचला तेव्हा तेथील लोकांची गर्दी पाहून त्याने स्वतःच्या हातातील तरवारीने अनेकांना मारले. छ. राजाराम महाराज जिंजीहून परत येताना येथे काही दिवस वास्तव्यास असल्याची नोंद आढळून येते तर मोगल बादशाह औरंगजेबाच्या ताब्यात हा किल्ला गेला असताना वसंतगडाचे त्याने केले "किली - द - फतह" असे नामकरण केले होते. मात्र फार दिवस तो मोगलांच्या ताब्यात राहिला नाही.
इ. स. १७०७ मधे महाराणी ताराराणीच्या वतीने परशुराम त्र्यबंक प्रतिनिधींनी मोगलांच्या ताब्यातील हा किल्ला जिंकून घेतला. छ. शाहू महाराजांच्या सुटकेनंतर रामचंद्रपंत अमात्य यांनी शाहूला पत्र लिहून त्यांचे अभिनंदन केले व त्याच्या स्वराज्याचा कारभारास शुभेच्छा दिल्या होत्या आणि हीच गोष्ट ताराराणीस न आवडल्याने तिने अमात्यांच्या पायात रूप्याच्या बेड्या घालून वसंतगड येथे कैदेत ठेवले होते. इ.स. १८०७ मध्ये दुसरे बाजीराव पेशवे व प्रतिनिधी यांच्यात तंटा निर्माण झाला तेव्हा पेशव्यांचा सेनापती बापु गोखले ( ) यांनी वसंतगडाजवळ प्रतिनिधींचा पराभव करुन त्यांना कैद करुन पुण्याला पाठवून दिले. यावेळी प्रतिनिधींची आश्रीत ताई तेलीन हिने बापु गोखले यांना बरीच टक्कर दिली. इ.स. १८१५ मध्ये गंगाधरशास्त्रीच्या खून केल्याप्रकरणी त्रिंबकजी डेंगळे यांस पेशव्यांनी कैद करुन येथे ठेवले होते मात्र या कैदेतून पसार होण्यात डेंगळे यशस्वी झाला होता. १३ मे १८१८ मधे ब्रिटिश मन्रोच्या नेतृत्वाखाली हा किल्ला इंग्राजांनी जिंकून पहिल्यांदा मुख्यदरवाजा पाडून टाकला.
गडावर पोहोचण्याच्या वाटा
  या इतिहासप्रसिध्द गडावर जायला दोन वाटा आहेत.
१) तळबीड वरुन :-
    वसंतगडाचे पायथ्याचे गाव म्हणजे इतिहास गाजवणार्‍य़ा सरसेनापती हंबींरराव मोहीते आणि महाराणी ताराबाई यांचे ‘तळबीड’ गाव. तळबीड हे वसंतगड या किल्ल्याच्या(पूर्वेस) पायथ्याचे गाव.कराडवरुन अर्ध्या तासाच्या अंतरावर तळबीड गाव आहे. कराड - सातारा रस्त्यावर कराड पासून ८ किमीवर तळबीडला जाणारा फाटा आहे. एसटी स्थानकावरुन तळबीडला जाण्यास दर अर्ध्या तासाला एसटी आहे. गावातच हंबीररावांचे स्मारक आहे. गाव संपल्यावर वसंतगडला जाण्याची चढण सुरु होते. वाट मळलेली आहे. पुढे वाट गडाला उजव्या हाताला ठेवत एका झाडाजवळ येते. तेथून सहजपणे गडमाथा गाठता येतो. गावातून किल्ल्यावर जाण्यास ४५ मिनीटे लागतात.
 कराड-चिपळून रस्त्यावरुन दिसणारा वसंतगड
२) वसंतगड गावातून :-
    याशिवाय कराड - चिपळूण रस्त्यावर , कराड पासून ९ किमी अंतरावर वसंतगड गावात जाणारा रस्ता आहे. गाव संपल्यावर वसंतगडला जाण्यासाठी मळलेली वाट आहे. तेथून उत्तरेला साडेतीन किलोमीटर वर वसंतगड हा किल्ला आहे.
हा किल्ला पुणे - बंगळूर या राष्ट्रीय महामार्गावरील कराड शहराच्या अलिकडेच असलेल्या तळबीड गावाशेजारी आहे. अर्थात तळबीड गाव पुणे-बेंगळुरूअशियाई महामार्गापासून जवळ पडत असल्यामुळे तळबीडला जाणे तुलनेने सोयीचे आहे.सहाजिकच बहुतेक दुर्गभटके तळबीड गावातूनच वसंतगडाला जातात.शिवाय या मार्गे गेल्यावर तळबीड गावातील हंबीरराव मोहितेंच्या समाधीचे दर्शनही घेणे शक्य होते.  तळबीड गावात आल्यावर समोरच सरसेनापती हंबीरराव मोहिते यांचे स्मारक दिसते.राष्ट्रीय महामार्गावरून कराडकडे जाताना टोल नाक्यापासूनच उजव्या बाजूला सुमारे तीन किलोमीटर अंतरावर तळबीड हे गाव आहे. 
गावात प्रवेश करतानाच समोर अतिशय देखणे असे सरसेनापति हंबीरराव मोहितेंचे स्मारक आहे. एकेकाळी दुर्लक्षित असणारी हि समाधी आज नवा साज घेउन डौलाने उभारली आहे. आपल्या या पराक्रमी भुमीपुत्राचा गावाला वाटणारा अभिमान या स्मारकातून दिसून येतो. बाहेर एतिहासिक तोफा ठेवल्या आहेत.आतमध्ये स्मारकाची आणि हंबीरराव मोहितेंची माहिती लावली आहे. आपणही यानिमित्ताने हंबीररावांविषयी थोडल्यात जाणुन घेउया. 
बाजी मोहिते पाटील तळबीड :-
    तळबीडचे मोहिते तस मातब्बर घराण मुळात तळबीडची कुसहि समर्थ शिलेदार जन्माला घालणारी कुस फत्ते पावन हेच ध्येय सहाजिकच माराठा लश्करात तळबीडकरानी भरल होत, रतोजी मोहिते निजामशाहीतील असा बलदंड माणुस की ज्याच्यावर झेंडा फडकवायला सारया शाह्या तग धरुन होत्या मुर्तुजा निजामशाहिचा विरोधक त्याच्याच लोकांनी बंड केला रतोजी त्यांना आडवा आला आणि असा पराक्रम केला कि ते बंडखोर जीव वाचवुन पळाले..हा पराक्रम पाहुण निजाम खुश झाला आणि या मोहिते बहाद्दरास ''बाजी "हा किताब बहाल केला. रतोजीँचा मुलगा तुकोजी तेथील मुतालीक चव्हाण यांना अभय,देउन तळबीडकरांच्या इच्छेनुसार पाटिलकी मिळवली...त्यांना तीन आपत्य संभाजी धारोजी आणि तुकाबाई.
    निजामशाही सोडुण नावारुपास आलेले शहाजीराजे यांच्यावर सरदार संभाजी अनंत याला धाडले गेले ..त्याने सालगण्या घाटात राजेँना कोंडले .त्या वक्ताला तिथे मोहिते बंधु मदतीला आले त्यांनी पराक्रम केला ..नंतर संभाजी -धारोजीच्या प्रस्तावावरुन तुकाबाईंना भोसले घराण्यात देण्यात आले इथुनच भोसले- मोहिते सोयरिक जमली. यावेळेपावतो तळबीडची पाटिलकी असलेले मोहिते -पाटिल संभाजी- धारोजीच्या पराक्रमामुळे प्रत्यक्ष शहाजीराजेंच्या मेहेनजरेमुळे आणि मोहित्यांच रक्त शिलेदाराच म्हणूनतर अदिलशाहित धारोजीनी "शुर सेनानी " मानाच स्थान हासील केल.
चंद्र कलेकलेने वाढतो तसेच छत्रपतीँच्या समर्थान हिंदवी स्वराज्य उभे झाले प्रत्यक्ष शिवछत्रपतींच्या खांद्याला खांदा लावुन शिलेदारी करणारे "मोहिते "स्वराज्यात हिराप्रमाने चमकले .प्रत्यक्ष संभाजी मोहित्यांचे पुत्र हंसाजी मोहिते हे मराठी दौलतीचे जुमलेदार होते ते सरनोबत झाले व हंबीरराव हा किताब मिळवला आणि मग काय दौलतीत सामिल झालेल्या गावात तळबीडचा दबदबा वाढला ..
तळबीडचे बाजी- मोहिते
रतोजी बाजीमोहिते
संभाजी बाजीमोहिते
धारोजी बाजीमोहिते
हंबीरराव बाजीमोहिते
तसेच महाराणी ताराराणी
तळबीडच्या मातीत सगळ्यांना हेवा वाटेल असा सेनानी जन्मला
  सरसेनापती हंबीरराव मोहीते -
   शिवशाहीच्या उदयापुर्वी अनेक कर्तबगार घराणी उदयास आली होती त्यामध्ये मोहिते, घाटगे, महाडिक, सुर्वे, जाधव, सावंत या विविध घराण्यांनी पराक्रमी पुरुषांनी मुस्लिम शाह्यामध्ये लष्करी सेवा करून नावलौकिक मिळवला होता.त्यांच्या भोसले घराण्याशी संबंध आला त्यावेळी नावलौकीकात आणखीनच भर पडली.काही घराण्यांनी छत्रपती घराण्यांशी नातेसंबंध निर्माण केला.त्यापैकी मोहिते घराणे जवळचे घराणे होते.या घराण्यात अनेक कर्तबगार पुरुष निर्माण झाले.याच घराण्यातील हंबीरराव मोहिते यांना शिवरायांनी अष्ठ्प्रधान मंडळामध्ये सरसेनापती म्हणुन स्थान दिले.खर्या अर्थाने हंबीरराव हे स्वराज्याचे पहिले सरसेनापती होते.हंबीररावांच्या अगोदर शिवरायांचे पराक्रमी सेनापती प्रतापराव गुजर व नेताजी पालकर यांचे स्वराज्यस्थापनेत मोठे योगदान आहे.परंतू त्यांच्याबाबतीत शोकांतिका झाली आणि साहजिकच हंबीरराव सरसेनापती झाले.
   सरसेनापती हंबीररावांच्या घराण्याचा इतिहास पाहिला तर तो गौरवशाली आहे.हंबीररावांचे पणजोबा रतोजी मोहिते यांनी निजामशाहीत मोठा पराक्रम गाजविला होता.त्यांना निजामशाहीने “बाजी” हा किताब दिला होता.हे घराणे तळबीड या गावची पाटीलकी सांभाळत होते.तुकोजी मोहिते हे पराक्रमी पुरुष तळबीड येथे आला व तेथील पाटीलकी सांभाळत सेवा करू लागला या घराण्याने घाटगे आणि घोरपडे घराण्याशी सोयरीक जुळवून आणली.याच दरम्यान शहाजीराजे यांच्याशी या घराण्यातील संभाजी व धारोजी मोहिते यांचा संबंध येवून शहाजीराजांच्या लष्कारात सामील झाले व मोठे शौर्य गाजवले.संभाजी मोहिते व धारोजी मोहिते त्या काळातील प्रराक्रमी सेनानी होते.त्यांच्या शौर्याची गाथा अदिलशाही फ़र्मानामध्ये पहावयास मिळतात.यातील संभाजी मोहितेचा मुलगा म्हणजे हंबीरराव मोहिते हा मर्दमराठा शिवरायांच्या सानिध्यात आले. सरसेनापति हंबीरराव मोहितेंचे मुळ नाव हंसाजी संभाजी बाजी मोहिते.सरसेनापति हंबीररावांचा जन्म इ. स. १६४० साली झाला. आपल्या पूर्वजांप्रमाणे ते एक कुशल योद्धा असल्याने छत्रपतींनी निर्माण केलेल्या स्वराज्याच्या सेवेत राहून पराक्रम करीत होते. कर्नाटक प्रांतातील शाह्यांना हंबीररावांच्या तलवारीने अनेकदा पाणी पाजले होते.
        स्वराज्याच्या स्थापनेवेळी संभाजी मोहिते हे शहाजी राजेंच्या लष्करात सहहवालदार होते.संभाजी मोहिते पुढे कर्नाटकला गेले मात्र आपली मुलगी सोयराबाई हिचा विवाह शिवरायांसोबत लावून दिला व छत्रपती घराण्यांशी पुन्हा नाते निर्माण केले.पुढे संभाजी मोहिते यांचा मुलगा हंबीरराव मोहिते यांनी आपली मुलगी ताराबाई हिचा शिवपुत्र राजाराम महाराजांशी विवाह लावून देऊन सरसेनापति हंबीरराव यांनी भोसले मोहिते यांच्या नाते संबंधातील परंपरा पुढे चालू ठेवली होती.मोहिते घराणे हे छत्रपतीचे अगदी जवळचे घराणे आहे.याच घराण्यातील उदयास आलेला मर्द मराठा म्हणजेच हंबीरराव मोहिते. शिवरायांच्या राज्याभिषेकापुर्वी महापराक्रमी सेनापती प्रतापराव गुजर बहलोल खानाशी झालेल्या संघर्षात मारले गेले.त्यांच्या शोकांतिकेनंतर ते सेनापती पद रिकामे झाले व ते पद हंबीरराव मोहितेंना दिले आणि अष्टप्रधान मंडळातील सरसेनापती पद म्हणुन मान मिळाला.हंबीरराव हा प्रतापरावांच्या सैन्यात सेनानी होता.ज्यावेळी प्रतापराव पडल्याचे कळाले तेंव्हा हंबीररावांनी अदिलशाहीच्या सेनेवर जबरदस्त हल्ला केला.शत्रुला विजापुरपर्यंत पिटाळून लवण्यात हंबिररावांचे मोठे योगदान आहे.सरसेनापती हा केवळ पराक्रमीच असून चालत नाही.तर तो प्रसंगाचा जाणकार व ह्रुदयाठायी शहाणपण आणि सबुरी असावी लागते.हे सर्व गुण हंबीररावांकडे होते.छत्रपती शिवरायांनी त्याच्या पराक्रमाचा गौरव म्हणुनच अष्ठ्प्रधान मंडळात स्थान दिले.महाराजांनी हंसाजी चा “हंबीरराव” हा किताबाने सन्मान केला.सरनौबत दिली.राज्याभिषेकानंतर मोघली सुभेदार दिलेरखान व बहादूरखान यांच्या छावण्यावर हल्ला करण्याचा आदेश शिवरायांनी हंबीररावांना दिला.
     हंबीररावांनी आपल्या कर्तृत्वाने स्वराज्याच्या सीमा सुरक्षित ठेवून, स्वराज्य विस्तारात महत्त्वाची भूमिका बजावली. छत्रपति शिवाजी महाराजांच्या अकाली निधनानंतर स्वराज्याच्या गादीचा वारसदार ठरताना योग्य व निर्णायक बाजू घेऊन छ. संभाजी महाराजांना उचित साह्य केले. नात्यापेक्षा कर्तव्य व सत्य श्रेष्ठ असते हे सरसेनापति हंबीररावांनी आपल्या कृतीतून सिद्ध केले. छ. संभाजी महाराजांच्या काळात म्हणजेच १६ डिसेंबर १६८७ रोजी मोगल सेनानी सर्जाखान याच्या सैन्याशी केंजळ ता. वाई येथे स्वराज्याच्या मावळी सेनेशी युद्ध झाले. या प्रसंगी  मावळी सेनेचे नेतृत्व सरसेनापति हंबीरराव यांच्याकडे होते. या युद्धात सर्जाखान सैन्याचा दारुण पराभव सरसेनापति हंबीरराव सैन्याने केला. मात्र पराजित सैन्यातील एका शत्रू सैनिकाच्या तोफेचा गोळा लागून स्वराज्याच्या सरसेनापति हंबीरराव मोहितेंनी आपला देह रणांगणावर ठेवला.
अशा या महान न्यायनितीचा आदर्श जीवनशैली जोपासणा-या पराक्रमी सरसेनापतींना वंदन करून किल्ले वसंतगडाकडे आपली पाऊले पडतात.
तळबीड गावात अलिकडेच नव्याने उभारलेले आकर्षण म्हणजे श्रीराम मंदिर.वसंतगड भेटीत या मंदिराला आवर्जून भेट द्या.
    तळबीड गावातून गडाकडे जाताना वाटेत अनेक समाध्या, वीरगळ आपल्या दृष्टीपथास पडतात. तळबीडच्या अनेकांनी देव, देश, धर्म यासाठी बलिदान दिलेल्या या पावन स्मृती आहेत. गावच्या मागील बाजूला असलेल्या महाराणी ताराराणी विद्यालयाच्या शेजारील पायऱ्यांचा रस्ता गडावर घेऊन जातो. सुमारे ९३० मीटर उंचीच्या गडावर पोहोचायला ४५ मिनिटांचा अवधी लागतो.
सुरवातीला पायर्‍या आहेत.नंतर मात्र अस्सल डोंगरवाटेने चढाई सुरु होते.तळबीड बाजूने साधारण दीडशे पायऱ्या लागतात. पुढं मळलेली चढण पायवाट लागते, गडाच्या पायथ्याशी मध्यम झाडी असुन डोगंरावर जसे जाऊ तशी झाडी विरळ होते. थोडे अंतरावर आल्यावर आपण खिंडीत पोहोचतो. या गडावर जाण्याच्या मार्गात केशरी रंगातील खुणांद्वारे मार्गिका आखणेत आल्या असल्याने गडाची चढाई सोइस्कर होते. या खिंडीमध्ये  वसंतगड गावाहुन येणारा रस्ता मिळतॊ .वाटेत डाव्या हाताला तळबीड गावाचे मनोहर दृष्य दिसते. तर उजव्या हाताला गडाची रचाई केलेली तटबंदी दिसते. या उतारावर मोठ्या प्रमाणात करवंदीची जाळी आहे.उन्हाळ्यात ईथे आलो तर हा रानमेवा नक्कीच चाखायला मिळतो.
 गडावरील पाहण्यासारखी ठिकाणे
      मोठया मोठ्या नैसर्गिक दगडी पायऱ्या चढत आपण तळबीड प्रवेशद्वाराजवळ पोहोचतो. हे प्रवेशद्वार गोमुखी बांधणीचे ( शत्रूला लक्षात येऊ नये म्हणून प्रवेशद्वार आतल्या बाजूला करतात , त्याला गोमुखी प्रवेशद्वार म्हणतात ) 
दरवाजा म्हणजे दगडात कोरलेल्या पायऱ्या सोडून इतर कोणतेही अवशेष नाहीत, आणि याचे कारण आहे ब्रिटिशांची हिंदुस्थानावर असलेली सुमारे दिडशे वर्षांची सत्ता. आमच्या पूर्वजांच्या ऐतिहासिक वारसास्थळांची तोफा लावून नासधूस केली या गो-यां राक्षसांनी.
दरवाजाच्या अलिकडे डाव्या बाजूला एका घुमटीत श्री गणेशाची चार साडेचार फूट उंच सुंदर मूर्ती पाहून आपले दोन्ही हात नकळतच जोडले जातात. गणेश दर्शनाने किल्ला चढणीचा आलेला शारीरिक थकवा एका क्षणात नाहिसा होतो. हिंदू धर्म संस्कृतीत देवदेवतांना अनन्यसाधारण महत्त्व का दिले जाते याची जाणीव झाल्याशिवाय राहत नाही. नव्या दमाने किल्ला पाहण्याची उत्सुकता निर्माण होते.
 त्यानंतर खडकात खोदलेल्या पायऱ्या चढून आपण किल्ल्याच्या माथ्यावर पोहोचतो. तटबंदीच्या आतील भागात शेजारीच श्री हनुमानाचे इवलेसे मंदिर व तिचे समोर असलेली भगवी पताका वा-यामुळे सतत फडकत असते.हनुमानाची मूर्ती उग्र स्वरूपातील दिसते. जवळ जवळ सर्व शिवकालीन गडावर, हनुमान उग्रस्वरूपात दर्शन देतात.(स्थानिक लोक याला' चपट्या / चापट्या मारुती' असं संबोधतात.या मूर्तीचा उजवा हात जणू काही, शत्रूला मारण्यासाठी उगारलेला असतो. डाव्या बाजूला गोलाकार पाण्याने भरलेली लहान विहीर आहे. एकंदरीत स्वरुप पहाता ईथे पहारेकर्‍यांच्या देवड्या असाव्यात हे निश्चित.
 गडावर प्रवेश करताच समोर एक झोपडीवजा हाॅटेल/दुकानआहे.( चहा नाश्त्याची सोय होवू शकते). इथून आपल्याला वसंतगडाचा विसृत पसरलेला माथा बघायला मिळतो. वसंतगडावरील जमीन सपाट आहे. गडाच्या माथ्यावर आपणास एक प्रचंड गोलाकार मैदान दिसते. अधून मधून झाडी दिसतात. मध्यभागी भरपूर झाडी व थोडासा उंचवटा आहे. तिथं चंद्रसेन महाराज यांचे जुन्या बांधणीचे मंदिर आहे. . वसंतगड किल्ला सर्वसाधारणपणे 120 एकर परिसरात पसरलेला आहे. येथून सरळ जाणाऱ्या पायवाटेने गेल्यानंतर आपण गडाच्या मध्यभागी असलेल्या श्री चंद्रसेन महाराजांच्या मंदिराशेजारी येऊन पोहोचतो.  
मंदिराच्या भोवती पुर्वी तटबंदी असणार.सध्या त्या भिंतीचे थोडे अवशेष आणि दरवाजा दिसतो. अर्थात हे ही आता मोडकळीस आले आहे. या मंदिराकडे जाणर्‍या पायर्‍यापैकी एका पायरीवर काही अक्षरे कोरलेली दिसतात.अर्थात अस्पष्ट असल्यामुळे वाचता येत नाहीत.
   चंद्रसेन महाराजांचे मंदिर दक्षिणाभिमुख  आहे. मंदिर सुरेख असून आत गाभार्यात चंद्रसेन महाराजांची मूर्ती आहे.चंद्रसेन महाराज हे अनेक मराठे घराण्यांचे कुलदैवत आहे. दगडी मंदिर असून प्रशस्त सभामंडप आहे. 
मंदिरासमोर एकाच दगडी चौथ-यावर दोन दीपमाळा असून दीपमाळेच्या पायथ्याशी अनेक भंग झालेल्या मूर्ती ओळीत मांडून ठेवलेल्या आहेत.पूर्वी एकच प्रचंड मोठी दीपमाळ होती. ती पडली, सध्या तिचे दोन भाग उभे आहेत. तसेच ईथे काही दगडी तोफगोळे ही आहेत. 
चंद्रसेन मंदिरातील मूर्ती अतिशय सुंदर असून तिच्या उजव्या बाजूला जोगेश्वरी तर डाव्या बाजूला जानाईदेवीची सुंदर मूर्ती आहेत. ही जानाईदेवी चंद्रसेन देवाची बहीण आहे, असे काहींचे मत आहे.चंद्रसेन हा शूर्पणखेचा मुलगा. महादेवाची खूप तपश्चर्या करून खड्ग प्राप्त करून घेतले. शेवटी लक्ष्मणाने त्याचे दोन्ही हात तोडले. सध्याच्या मूर्तीचे दोन्ही हात अर्धेच आहेत. मात्र उत्सवमूर्ती पूर्ण हातांची आहे.इकडे याला चंद्रोबा / चांदोबा असेही म्हणतात.शुर्पणखेचे नाक कापून कोयनेच्या डोहात टाकले म्हणुन तिथे अजूनही नकटे मासे सापडतात.सुपने गावातील दैत्य मंडळी,जोमलिंग या गोष्टी या कथेला पुरावा म्हणुन स्थानिक लोक दाखवितात.
     या चंद्रसेन महाराजांना  अनेक घरंदाज मराठे घराणी चंद्रसेनाला आपले कुळदैवत मानतात. जोगेश्वरी माता आणि चंद्रसेन महाराज यांचा विवाह लावण्याची प्रथा आहे. भक्तांनी चंद्रसेन देवाची मंदिरे आपआपल्या गावी बांधली आहेत. त्यात निमसोडचे घाडगे यानी निमसोडला तीन मंदिरे बांधली आहेत , रायगाव, धोडवाडी, पलसगाव, कोळ, पुसेसावळी, विटा अशा अनेक गावात चंद्रसेन मंदिरे आहेत. या चंद्रसेनाचा वध लक्ष्मणाने चैत्र वद्य एकादशीला केला म्हणुन या चंदोबाची यात्रा त्याच दिवशी असते. 
     मंदिर प्रदक्षिणा करीत असताना उजवीकडे असलेल्या भिंतीवर एक शिलालेख असून इ. स. १७०० साली मंदिर जीर्णोद्धारासाठी मदत केलेल्या व्यक्तींच्या नावांची यादी कोरलेली आहे. चंद्रसेन महाराजांची यात्रा चैत्रातील दुसऱ्या पंधरावड्यात या किल्ल्यावर दरवर्षी भरते तर दस-याला पूर्वीचे बारा बलुतेदार चंद्रसेन महाराजांच्या पालखी घेऊन गड पठारावर प्रदक्षिणा करतात. चंद्रसेन महाराजांचा संबंध पुराणातील रामायणाशी असल्याच्या विविध आख्यायिका भक्तजनांच्या मनात रूजलेल्या आहेत. 
याच चंद्रसेन मंदिराच्या बाहेर पडल्यावर मागेच गर्द झाडीत असलेल्या श्री.सूर्यदेवता आणि श्री. नरसिंह देवता यांच्या मूर्ती नुकत्याच टिम वसंतगडला सापडल्या. टिमच्या सदस्यांनी श्रमदान करुन श्री नरसिंह व श्री सुर्यदेवता मंदिर परिसरातील झाडी काढून मंदिराकडे जाणारा रस्ता घनदाट झाडीने बंद होता तो पुर्णपणे मोकळा करण्यात आला.या ठिकाणी खूप झाडी असल्यामुळे पुर्वी हे मंदिर दुर्लक्षित होते पण आता ते प्रकाशात आणण्याचे काम 'टीम_वसंतगड 'च्या सदस्यांनी केले.
मंदिराकडे जाताना उजव्या बाजूला एका भल्यामोठ्या वाड्याचे अवशेष दिसून येतात. हा वाडा या किल्ल्याच्या किल्लेदाराचा  असावा.
 इथून पुढे डाव्या बाजूला लक्ष्मी मंदिर आहे त्यामध्ये शिवलिंग व गजांतलक्ष्मी पहावयास मिळते. या मंदिराच्या डाव्या बाजूलाच वाड्याचे अवशेष आहेत. व उजवीकडे विठ्ठल मंदिर आहे . याची थोडी पडझड झालेली दिसते.
या मंदिराच्या अलिकडे श्रीराम व मारुती मंदिर आहे. ही दोन्ही मंदिरे पाहताना श्रीराम, माता सीता, लक्ष्मण यांच्या संगमरवरी सुंदर मूर्ती पाहून एक जाणीव होते की, मर्यादा पुरूषोत्तम श्रीरामाचा वनवास अजूनही संपलेला नाही.  या मूर्ती दोन वेळा बसवल्याचे लक्षात येते. जुन्या(भंगलेल्या ) खाली आणि नवीन चौथऱ्यावर आहेत.
याशिवाय याच परिसरात दगडी जाते हि दिसते.
   मंदिर परिसर पाहून डाव्या बाजून मंदिराच्या बाहेरील वाटेने पुढे उत्तर दिशेने गेल्यास वाटेत आपणास चुन्याच्या घाण्याचे अवशेष दिसतात.
  गडाच्या मध्यभागी असलेली मंदिरे आणि इतर अवशेष पाहून पुन्हा गडाच्या पुर्व दरवाज्याक्डे यावे.ईथून तटबंदीवर चढून गडाच्या माथ्याचा फेरफटका करुया.  गडाच्या चारी बाजूंनी चार डौलदार बुरूज असून त्यावर चढण्यासाठी दगडी जिनेही आहेत.गडाभोवती तटबंदी आहे व चार बुरुज आहेत. त्यातील दोन पूर्वेकडील व पश्चिमेकडील बुरुज चांगल्या स्थितीत आहेत.
बारकाईने बघीतले तर बुरुजांच्या बांधणीचे एक वेगळे वैशिष्ट्य ईथे दिसून येते.बहुतेकदा तटबंदीच्या बाहेर बुरुज आलेले असतात.ईथे मात्र तटबंदी पुढे आणि बुरुज मागे अशी वेगळीच रचना पहावयाला मिळते. दोन बुरुज तर तटबंदीपासून आत सुटे बांधले आहेत. याच प्रकारचे बुरुज संकेश्वरजबळील वल्लभगडावर बघायला मिळतात. बुरुज मागे असल्यामुळे पहारेकर्‍यांना वावरण्यासाठी असलेली शेरहाजी बुरुजाच्या तळाशी बाहेरुन बांधलेली आहे. वास्तविक शिलाहार भोज राजा ( दुसरा ) याने या परिसरातील बाकीचे गड उभारुन सुध्दा तटबंदी आणि बुरुजांचे हे वैशिष्ट्य इतर गडावर बघायला मिळत नाही.तेव्हा हि तटबंदी भोज राजाच्या कारकीर्दीत उभारली कि नंतर ? असा प्रश्न पडतो. 
गडाच्या आग्नेय टोकाच्या बुरुजाची बांधणी आवर्जून पहावी अशीच आहे.ईथेच एक तटबंदीत लपविलेला शौचकुप आहे.  
गडाच्या या बाजुला खाली वसंतगड गाव दिसते.या बुरुजाखालील डोंगर सोंडेवर एक चौकोनी आकाराची गुहा आहे. हा बहुतेक गुप्त मार्ग गडावर निघाला असावा. कारण गुहेचा शेवट कुठपर्यंत आहे , हे शोधता आलेले नाही. या गुहेची उंची पावणे दोन फ़ुटांपर्यंत असुन रुंदी फ़ारच कमी आहे.एकावेळी गुहेत एकच व्यक्ती यागुहेची लांबी वीस फ़ुटांपर्यंत असुन शेवटच्या टॊकाला विहीरसादृश्य रचना बाहेरुन दिसली. इथे वटवाघुळांचा रहिवास असल्याने दुर्गधींमुळे शेवटच्या टोकापर्यंत जाऊ शकत नाही. कदाचित ही गडावर जाण्याची चोरवाट किंवा चकवा असण्याची शक्यता असावी. 
गडाच्या तटबंदीवरुन वाट्चाल सुरु ठेवायची. या दक्षिण बाजुला आडवा तिडवा पसरलेला बौध्द लेण्यांनी पोखरलेला आगाशिवाचा डोंगर दिसतो. फिरत फिरत आपण गडाच्या पश्चिम बाजुला आलो कि आपल्याला कोयना नदी आणि तिचे अफाट पसरलेले खोरे दिसते.या बाजुला सह्याद्रीच्या निळसर रांगाचे मनमोहक दर्शन होते. वातावरण स्वच्छ असल्यास गुणवंतगड उर्फ मोरगिरी आणि काळगाव परिसरातील गुढे पाचगणीच्या पठारावरील पवनचक्क्या दिसतात.  
याच बाजुला कमळ फुलांनी लगडलेले कोयना तळे आहेत. गडाच्या विस्तृत पसरलेल्या माथ्यावर बरेच पावसाळी तलाव आहेत. यातील कोणत्याच तळ्याचे पाणी पिण्यायोग्य नाही.अर्थात त्यातील कोयनातळे व कृष्णातळे अशी दोन तळी आहेत.कोयना तळे गडाच्या पश्चिम बाजुला आहे .या तळ्यात असलेले पांढऱ्या रंगाची कमळपुष्प पाहताना मनाला आनंद होतो. आज जर हे वैभव दिसत आहे तर मराठ्यांचा सुवर्णकाळात काय असेल याची कल्पनाच केलेली बरी.  यांच्या काठावर जुन्या समाध्या व सतीशिळा आहेत.इतिहासात उल्लेख केल्याप्रमाणे, गडावर बारा बुरुज आणि तीन विहिरी होत्या.गडावर या तीन विहिरीतील गाळ काढूनही, त्या किती खोल आहेत याचा अंदाज येत नाही. इंग्रजांनी या विहिरीत गडावरील तोफा टाकून दिल्या, असं काही म्हणतात तर काहीजणांच्या मते इंग्रजांनी तोफा गडाखाली ढकलुन दिल्या.गडमाथ्याची भटकंती करताना हे सर्व तलाव आपल्याला दिसतात.
तसेच पुढे गेल्यास गडाच्या वायव्य बाजुला एक बुरुज दिसतो .या बुरुजावर जिना असून आपल्याला वर जाता येते. वर टेहळणी करण्यासाठी तीन फूट उंचीचा मोठा झरोका आहे,त्यातून आजूबाजूचा परिसर स्पष्ट दिसतो.तिथून खाली साकुर्डी गाव आणि ' भवानी मातेचे मंदिर' दिसते.
यानंतर आपण येतो गडाच्या उत्तर टोकाकडे. पश्चिम बुरुजाजवळ किल्ल्याचे दुसरे प्रवेशद्वार आहे.  किल्ल्यावरील पश्चिमेस असणारा एकमेव दरवाजा सुस्थितीत असून याचे बांधकाम गोमुखी पद्धतीचे आहेत. हा किल्ला जरी भोज राजाने बांधला असला तरी संरक्षणाच्यादृष्टीने त्या त्या काळानुसार त्याचे रचनेत बदल केले गेले त्यानुसार या दरवाजाच्या बाजुचे बुरुज बाहेरील बाजुस दरवाजा सहज दृष्टीक्षेपात येणार नाही असे बांधले आहे
 हे काम शिवकालिन असल्याचे त्याचे रचनेवरुन दिसते. या दरवाजाच्या डाव्या बाजूला तटबंदीच्या आतील भव्य गोलाकार बुरूज असून तो अखेरच्या घटका मोजत आहे, तर उत्तरेच्या बाजूचा बुरूज देखील त्याच अवस्थेत आहे. या दोन्ही बुरूजावर जाण्यासाठी वर्तुळाकार सुमारे २५ ते ३० पायऱ्या आहेत. पूर्वेला असलेला बुरूज, तटबंदी व दरवाजा जवळजवळ नष्ट होत आला आहे.   वसंतगडावरील तटबंदी, दरवाजा व वाड्यांचे अवशेष हे सर्व जांभ्या दगडातील असल्याने ऊन, वारा व पावसाने भग्न होण्याच्या स्थितीत आहेत.
या दरवाजाचे चौकटीचे बाहेरील बाजुस डोक्यावर शेपुट असणारी लढाऊ वीर हनुमानाची मुर्ती आहे. याही बुरुजाशेजारी देवडीचे अवशेष असुन त्याच्या समोर भिंतीचे अवशेष आहेत त्याच्या रचनेवरुन ती सदर असावी. याच पूर्वेकडील तटबंदीत एक सुस्थितीतील तत्कालीन शौचकूप आहे.गडाच्या उत्तरेकडील बुरूजाशेजारी श्री हनुमानाची भग्न मुर्ती सापडली आहे. या दरवाज्यातून बाहेर पडणारी वाट खाली बेलदरे गावाच्या हद्दीतील नाईकबा देवस्थानाकडे जात असल्याने याला 'नाईकबा दरवाजा' म्हणतात.समर्थ रामदासांच्या ११ घळींपैकी चंद्रगिरी घळ वसंतगडापासून दिड ते दोन तासांच्या अंतरावर आहे. वसंतगडावरील पश्चिमेच्या प्रवेशव्दारातून म्हणजेच नाईकबा दरवाज्यातून बाहेर पडून खिंडीत उतरावे.गडाच्या पश्चिमेला, गडावरून उतार सुरु होतो, आणि पुन्हा डोंगर सुरू होतो.तिथून चरेगाव बेलदरे गावातून चंद्रगिरी घळ गाठावी. परत येतांना वसंतगडा पर्यंत न येता चरेगावात उतरावे. तिथून कराडला येण्यासाठी वडाप व बसची चांगली सोय आहे.
गडाचे उत्तर टोक बघीतले कि आपला परतीचा प्रवास सुरु होउन पुन्हा तळबीडकडे असणार्‍या पुर्व बाजुच्या दरवाज्याकडे येण्यासाठी आपण निघतो. तेथुन पुढे आपण शेवटच्या बुरुजाकडे निघूया.वसंतगडाच्या डोंगराला नैसर्गिक कातळकडा पुरेसा उंच नसल्याने पुर्ण गडमाथा वेढणारी तटबंदी बांधलेली दिसते. तटबंदी वरुन जाताना ठिकठिकाणी मशाल ठेवण्याच्या खोबण्या आहेत.गडावर नजरेत मावणार नाही एव्हडं विस्तीर्ण पठार आहे.  तटबंदीला अतिरिक्त पाणी वाहून जाण्यासाठी छोटे छोटे आऊटलेटस आहेत.
या बाजुला आणखी एक बुरुज असून त्यावर चढण्यासाठी बाहेरुन गोलाकार पायर्‍या आहेत. त्यावर चढल्यास पुर्व बाजुचा पसरलेला नजारा दिसतो.  या बुरुजाच्या शेजारी एका कोठीचे अवशेष दिसतात. हि पहारेकर्‍यांसाठी असावी. 
यामध्ये ईशान्येला मसुर भागातील डोंगर, गडाच्या खालच्या बाजुला तासवडे एम.आय.डी.सी. आणि तासवडे टोलनाका, जमीनीवर काळी रेघ ओढल्यासारखा दिसणारा पुणे-बेंगळूरु महामार्ग आणि त्यावरुन अखंडीत धावणारी वहाने, हिरव्यागार शेतींने झाकलेली सुपिक जमीन चिरत धावणारी कृष्णा नदी, आग्नेयेला सदाशिवगड आणि लांबवर कराड शहर. निवांत बसून अनुभवावा असा हा नजारा.
 ईथून पाय निघत नाहीत्,मात्र कर्तव्याची जाणीव होउन नाईलाजाने आपण उठतो. थोडे अंतर गेले कि आणखी एक प्रशस्त तलाव दिसत्प. हे आहे कृष्णा तळे. याला गर्द झाडीचा वेढा पडलेला आहे.
या तळ्याच्या काठावर अनेक अज्ञात समाध्या व सतीशिळा आहेत. या अवशेषांवरुन एक निश्चित होते की वसंतगड रक्षणासाठी अनेक पराक्रमी योद्ध्यंनी आपल्या प्राणाची आहुती दिली आहे.वसंतगडावर सैनिक संख्या मोठ्या प्रमाणात असल्याचे अनेक वाड्यांच्या जोत्याचे पुरावे दिसून येतात. गडावर लहानमोठी सहा तळी असल्याने पाणीसाठा विपुल असावा.
  पुढे गेले कि जमीनीतच पडलेला वेडावाकडा रुंद चर बघायला मिळतो. हे नैसर्गिक टाके असावे. ईथे पावसाळ्यात पाणी भरते. त्यामुळे याचा उपयोग पाण्याच्या टाक्यासारखा होत असणार. टिम वसंतगडने याची नुकतीच स्वच्छता केली. गडावरचे  प्रचंड पठार आणि पावसाळ्यात त्यावर उगवणार्‍या गवतामुळे परिसरातील गावातील जनावरांची मोठ्या प्रमाणात वर्दळ ईथे असते. या तालावातील पाणी त्यांना उपयोगी पडते.
  यानंतर परतीची वाट पकडली कि आपण उन्हा दरवाज्या पाशी येतो आणि आपली गडाफेरी संपते.
गडमाथ्यावर काळी माती आहे, भर पावसाळ्यात बऱ्याच ठिकाणी भरपूर प्रमाणात गुडघाभर चिखल असतो. त्यामुळे फिरणे सोयीचे होत नाही.शक्यतो सरता पावसाळा ते अगदी मे महिन्यात सुध्द्दा वसंतगडाला भेट देता येईल.

साखरगड निवासिनी: देवी यमाई अर्थात अंबाबाई:

    कोरेगावच्या उत्तरेला ११ कि. मी. वर वसना नदीच्या उपनदीकाठी किन्हई वसले आहे.हे पंत प्रतिनिधींचे मूळ गाव असून ते या गावचे कुलकर्णी होते. त्यांनी पुढे औंध संस्थानाची स्थापना केली. औंध संस्थान विलीन झाल्यावर किन्हईचा कोरेगाव तालुक्यात समावेश करण्यात आला. गावात पंत प्रतिनिधींचा मोठा वाडा असून तो सुंदर व मजबूत आहे. वाड्याभोवती तटभिंत असून इमारतीचा खालील भाग दगडी व वरील विटांचा आहे.येथील स्वागत कक्ष भव्य आहे. वाड्यातील काही खोल्यांचे बांधकाम सुंदर आहे. या वाड्यात सध्या कर्मवीर भाऊराव पाटील विद्यालय कार्यरत आहे. वाड्याच्या पाठीमागे ओढ्याच्या उजव्या तीरावर महादेवाचे मंदिर असून त्यास ओढ्याच्या पात्रापर्यंत पायर्‍या आहेत. मंदिरास सर्व बाजुने खुला मंडप आहे. त्यास गाभारा व शिखर आहे.
गावाच्या अग्नेयेस असलेल्या टेकड्यांपैकी पूवेकडील टेकडीवर साखरगड निवासिनी (पंत प्रतिनिधींची कुलदेवता) यमाई  देवीचे मंदिर आहे. मंदिराकडे जाण्यासाठी गावातून सरळ रस्ता आहे. टेकडीच्या पायथ्यापासून मंदिरापर्यंत दगडी पायर्या आहेत. मंदिराभोवती तटभिंत असून तिला आतून मारा करण्यासाठी जंग्या आहेत. 
मंदिराचे प्रवेशद्वार पश्चिमेला असून त्यास कमान आहे. कमानीवर नगारखाना आहे. पूर्वेकडे आणखी एक प्रवेशद्वार असून ते टेकडीच्या दक्षिणेकडून येणार्‍या भाविकांसाठी आहे.प्रवेशद्वारातून आत आल्यावर पायरीवर पण एक शिलालेख आहे. 
 मंदिराच्या डाव्या बाजुस छताजवळ लहान प्रवेशद्वाराच्या उत्तरेस दोन्ही बाजुला दीपमाळा आहेत. एका दीपमाळेवर दोनदा वीज पडून पडझड झाल्याने ती पुन्हा बांधण्यात आली. परंतु तीच्यावर तिसर्‍यांदा वीज पडली तेव्हा तो अपशकून समजण्यात आला. दीपमाळेचे नंतर केव्हातरी बांधकाम केले आहे. एका दीपमाळेवर शिलालेख कोरला आहे. 
गाभारा चौकोनी असून त्यात पितळी मुखवटा असलेली देवीची मूती आहे. गाभाऱ्यात देवी अंबाबाई आहे तर मंदिराच्या प्रवेशद्वाराशी नंदी. हे या मंदिराच एक वैशिष्ट्य. मूर्ती दागिन्याने मढवलेली असून मूर्तीवर पडणारा प्रकाश परावर्तीत होण्यासाठी दागिन्यात काचेचा वापर केला आहे.या देवीची यात्रा कार्तिक पौर्णिमेपासून १५ दिवस असते.
मंदिरावर असंख्य दगडी कोरीव शिल्प आहेत.देवादिकांच्या किती सुंदर, रेखीव , रंगीत आणि सुबक प्रतिमा कोरल्या आहेत. नुकतेच त्यांचे नूतनीकरण झाले आहे.
जावे कसे ? 
    सातार्‍यावरुन सातारा रोड-नांदगिरीमार्गे किन्हईला जाता येते.

किन्हई - सगळ्या महाराष्ट्राची कुलदेवता आहे तुळजापूरची तुळजाभवानी. या भवानी मातेचं एक रूप आहे साताऱ्याजवळ, किन्हईत, साखरगडवासिनी नावाने. एका टेकडीवर ही औंधच्या यमाई देवीची बहीण असल्याचं सांगतात.
औंधच्या पंतप्रतिनिधींची ही कुलदेवता. पंतप्रतिनिधी मूळचे याच गावचे कुलकर्णी. गावामध्ये त्यांचा एकेकाळचा राहता वाडा आहे. सध्या त्यामध्ये रयत शिक्षण संस्थेचे कार्यालय असले तरी त्याची अंतर्गत रचना पाहण्यासारखी आहे.
गावाच्या एका बाजूला, दोन कि.मी. वरील टेकडीवर या देवीचे मंदिर आहे. इथे येण्यासाठी दोन मार्ग आहेत. पहिला टेकडीच्या पायथ्यापासून जवळपास २५० पायऱ्यांचा; आणि दुसरा गडाच्या उजव्या बाजूकडून घाटाने जाणारा डांबरी पक्का रस्ता. या मार्गाने आल्यास, घाटाच्या सुरुवातीला, घाटाई देवीचे मंदिर आहे. त्यावर लिहिलेल्या लेखानुसार, हे मंदिर रामचंद्र पंतप्रतिनिधी यांनी बांधलेलं आहे. घाटाने वर आल्यावर १४-१५ पायऱ्याच चढाव्या लागतात. या तटबंदीमधील पायऱ्यांनी वर गेल्यावर, मंदिरआवारात, मागून प्रवेश करावा लागतो. आवारात डाव्या बाजूला काळ्या पाषाणामध्ये देवीची मीटरभर उंचीची मूर्ती रंगविलेली आहे. तटबंदीमधील दरवाज्यावर नगारखानाही आहे. पायऱ्यांनी आल्यास मंदिराच्या उजव्या बाजूच्या दरवाज्यातून आत यावे लागते. कोणत्याही बाजूने आलं तरी आवारात आल्यावर प्रथम लक्ष वेधून घेते ती मंदिरासमोरील दीपमाळ. या दीपमाळेशिवाय मंदिर आवारात आणखी तीन दीपमाळा आहेत. त्यांपैकी मंदिरासमोरील दोन दीपमाळांवर लेख कोरलेले आहेत. या दीपमाळांपैकी एकीवर तीन वेळा वीज पडली असल्याचं सांगतात. मंदिराच्या डाव्या बाजूला काही ओवऱ्या आहेत. मंदिर हेमांडपंती पद्धतीचे असून एक मीटर उंचीच्या जोत्यावर बांधलेले आहे. मंदिराचा मंडप मात्र लाकडाचा आहे. यामध्ये १९३३-३४ साली काढलेली काही चित्रे (पेंटिंग्ज्) लावलेली आहेत. ती औंध गावात असणाऱ्या मंदिरामधील चित्रांची आठवण करून देतात. शिवाय इथे काही देवदेवतांची चित्रेही लावलेली आहेत. मूळ मंदिरामध्ये या मंडपाला जोडलेला आणखी एक (पहिला) मंडप आहे. याला तीनही बाजूला दरवाजे आहेत. गाभारा मात्र पूर्णपणे बंदिस्त असून, देवीच्या दर्शनासाठी गाभाऱ्याला एक काचेची फ्रेम बसविलेली आहे. गाभाऱ्याच्या चौकटीवर सुंदर कोरीवकाम केलेले आहे. याच्या दोन्ही बाजूला व्यालांचे शिल्प आहे. गाभाऱ्यातील देवीच्या मूर्तीला पितळी मुखवटा असून तिला अनेक दाग-दागिने घातलेले आहेत.
मंदिराच्या कळसावर भरपूर शिल्पं कोरलेली आहेत. यांमध्ये विष्णू दशावतार, राम-भरत भेट, देवी-देवता यांची शिल्पं असून त्यावर काही ठिकाणी जुन्या काळातील रंगही शिल्लक आहे. कळस वगळता मंदिराची रंगरंगोटी केलेली आहे. शिवाय काही भागांची वेळोवेळी योग्य प्रकारे डागडुजीही केलेली आहे. मंदिराच्या डाव्या बाजूला पुजाऱ्यांचे निवासस्थान आहे.

किकलीचे श्री भैरवनाथ मंदिर

           पुणे-सातारा या राष्ट्रीय हमरस्त्याने वाई-महाबळेश्वरकडे जाताना खंबाटकी घाट उतरल्यावर भुईंज हे गाव लागते. तिथेच डावीकडे चंदन-वंदन किल्ल्यांची जोडी नजरेस पडते. या दोन किल्ल्यांच्या मध्ये एक रुंद खिंड आहे. दोन्ही गडमाथ्यांकडून उतरत आलेले तीन टप्पे पायर्‍यांसारखे दिसतात. हमरस्त्यावरच भुईंज गावातून डावीकडे वळल्यावर पाचेक किमी अंतरावर किकली गाव. गावाच्या सुरुवातीलाच किसनवीर साखर कारखाना आहे. किकली गावात देखण्या प्रवेशद्वाराचे, दीपमाळा असणारे, चिरेबंदी बांधणीचे एक शिवमंदिर आहे. त्याला श्री भैरवनाथ मंदिर म्हणतात. खूप कलाकुसर असणारे हे ठिकाण.
       किकली गावाच्या अगदी सुरुवातीलाच उजवीकडे श्री भैरवनाथ मंदिराकडे जाणार्‍या पायर्‍या व मंदिराच्या नावाची कमान दिसते. १५/२० पायर्‍या चढूनच आपण मंदिराच्या प्रवेशद्वारात येतो. प्रवेशद्वारातून आत येताच मोठे पटांगण आहे व त्यापुढे मुख्य मंदिर आहे.
चंदन- वंदन
मंदिर प्रवेशद्वार
प्रवेशद्वारातून दिसणारे मुख्य मंदिर
प्रवेशद्वारातून आत येताच मधे पटांगण आहे व दोहो बाजूंना ग्रामपंचायतीची शाळा आहे. उजव्या हाताला एक उद्ध्वस्त मंदिराचे अवशेष आहेत. ह्या उद्ध्वस्त मंदिराशेजारीच झाडोर्‍यात गणेशवंदना कोरलेला एक भग्नावस्थेतला स्तंभ आडवा पडलेला आहे.
उद्ध्वस्त मंदिराचे अवशेष
गणेशवंदना कोरलेला भग्नावस्थेतला स्तंभ
मुख्य मंदिराच्या बाहेर २ भव्य दिपमाळा आहेत. मंदिराचा बाह्य भागा साधा आहे तर पूर्वीचे शिखर नष्ट झालेले आहे त्यामुळे मंदिराची मूळची शैली नेमकी कुठली ह्याचा अंदाज बांधता येत नाही पण महाराष्ट्रातील इतर ह्याच काळातील मंदिरांसारखी ह्याची शैली पण भूमिज असावी असा कयास बांधता येतो. आता प्रश्न येतो मंदिराचा कार्यकाळ नेमका कुठला? चंदन वंदन ही शिलाहारांची निर्मिती असल्याने साहजिकच ही शिलाहारांची निर्मिती वाटते पण तसे नसावे. शिलाहारांची इतर मंदिरे जसे कुकडेश्वर, अमृतेश्वर, नागेश्वर ह्यांपेक्षा ह्या मंदिराची शैली भिन्न आहे. तिचे साधर्म्य यादवकाळातील मंदिरांशी जास्त जाणवते. मला स्वतःला हे मंदिर आणि त्यांतील मूर्तींची शैली ही पिंपरी दुमाला, लोणी भापकर आणि पेडगाव येथील मंदिरांच्या शैलीशी जास्त मिळतीजुळती वाटली.
सिंघण यादवाने १३ व्या शतकात खिद्रापूरनजीक भोजराजा शिलाहाराचा पाडाव करुन कोल्हापूर शिलाहारांची राजवट नष्ट केली तत्पुर्वीच सिंघणाच्या आक्रमणात हा भाग यादवांच्या राज्यात सामील झाला व यादव राजवटीतच ह्या मंदिराची उभारणी झाली असावी.
ह्या मंदिराची रचना तशी अनोखी. आधी मुखमंडप. येथे नंदीमंडप हा स्वतंत्र नसून मुखमंडपातच नंदी सामावलेला आहे. त्यानंतर येतो तो सभामंडप आणि समोर मुख्य गर्भगृह आणि डाव्या-उजव्या बाजूला अजून दोन गर्भगृहे. ह्या प्रकारच्या तीन गर्भगृहांच्या रचनेला 'त्रिदल गाभारा' असे म्हणतात. मुखमंडप आणि सभामंडप हा नक्षीदार स्तंभांवर तोललेला आहे.
मंदिरांच्या बाह्यभिंतींच्या भागात कसलेही कोरीव काम नाही. ते आहे फक्त मुखमंडपाच्या समोरील आणि डाव्या-उजव्या बाजूच्या भिंतींवर. त्यावर काही मैथुन शिल्पे, काही वादक व व्यालांची विविध शिल्पे कोरलेली आहेत.
भैरवनाथ मंदिर, किकली
मुखमंडप
मुखमंडपाच्या समोरील बाजूस विविध प्रकारचे व्याल कोरलेले आहेत. सर्वसाधारणपणे व्याल म्हणजे सिंहाचे वरील दोन्ही पाय उंचावलेले असे स्वरूप. दा़क्षिणात्य मंदिरांवर व्याल मोठ्या संख्येने कोरलेले आढळतात. येथे मात्र व्यालशिल्पांना केवळ सिंहाचेच मुख नसून गज, अश्व, शुक, मेष, गर्दभ अशी विविध मुखे कोरलेली आहेत.

मेषव्याल --------------शुकव्याल -------------- अश्वव्याल --------------वृषभव्याल
a-a--a--a

गर्दभव्याल --------------------- सिंहव्याल ------------------------ वराहव्याल---------व्याघ्रव्याल
मुखमंडपाच्या भिंतीवरील वादक
मुखमंडपावरील शिल्पे- गरुड, विष्णू, मैथुनशिल्प, ऋषी व त्याखालील व्यालपट्टीका
ह्या शिवाय येथे एक प्रसवेचेही (बाळाला जन्म देत असलेली स्त्री) शिल्प आहे.
प्रसवा
चला तर आता मुखमंडपातून सभामंडपात जाऊयात.
सभामंडपाचे प्रवेशद्वार अतिशय नक्षीदार असून त्याच्या दोन्ही बाजूंस द्वारपाल, सेवक, शैवप्रतिहारी वगैरे कोरलेले आहे. प्रतिहारींच्या खालच्या भागात हत्ती व शरभ आदी कोरलेले आहेत. द्वारपट्टिकेवरील गणपती नसून तपस्व्याची मूर्ती कोरलेली आहे. मला सर्वप्रथम ती मूर्ती महावीरांची वाटली. पण ते महावीर नसावेत कारण मंदिर पूर्णपणे शैव आहे.
सभामंडपाचे प्रवेशद्वार
प्रतिहारींच्या हाती नेहमीच एक लांबुळकी पिशवी दिसते ह्याचा अर्थ असा की मंदिराच्या बांधकामासाठी ह्या पिशवीतून ते धन, जल आदी आणत आहेत.
प्रवेशद्वारावरील भैरव द्वारपाल, प्रतिहारी
गज व शरभ
प्रवेशद्वाराच्या उंबर्‍यावरील नक्षीकाम
सभामंडप अतिशय नक्षीदार स्तंभांवर तोललेला आहे आणि स्तंभांवर मध्यभागी काही पौराणिक प्रसंग कोरलेले आहेत तर स्तंभाच्या खलाच्या भागात सुरसुंदरी, भैरव आदि शिल्पे कोरलेली आहेत.
आता सभामंडपांतील स्तंभांवरची काही निवडक शिल्पे पाहूयात.

सभामंडपाची रचना
हे आहे तीन धडे व चारच पाय असणारे आभासी शिल्प. अशी शिल्पे पिंपरी दुमाला, भुलेश्वर, पेडगाव अशा मंदिरांतही आहेत.
आभासी शिल्प
याजनंतर येते ते त्रिविक्रमाचे शिल्प. स्तंभाच्या दोन बाजूस दोन प्रसंग कोरलेले आहेत. एका बाजूस वामन अवतार तर त्याच्या शेजारील बाजूस त्रिविक्रम अवतार.
छत्रीधारी वामन बळीराजाच्या दरबारात तीन पावले भूमीचे दान मागायला आलेला दिसतो आहे. ह्याच्या पुढच्या अर्ध्या भागात बळी राजा कमंडलूतून वामनाच्या हातावर पाणी सोडून दान देतो आहे तर शेजारी शुक्राचार्य वामनाचे कपट ओळखून त्याला बळीला अटकाव करत आहे.
ह्याचाच शेजारी स्तंभाचे दुसरे बाजूस त्रिविक्रमाचे शिल्प आहे. दोन पावलांनी आकाश व जमीन वापून विष्णू प्रकट झाला आहे. तिसर्‍या पावलाने बळीचे मस्तक व्यापून त्याला पाताळात जागा दिलेली आहे तर बळीचे शेजारी गरुड आणि एक विष्णूगण दिसत आहे.
वामनावतार
त्रिविक्रम
रामायणातीलही विविध प्रसंग येथील स्तंभांवर कोरलेले आहेत.
रामहस्ते सुवर्णमृगाचे रूप धारण केलेल्या मायावी मारीच राक्षसाचा वध
राम हनुमानाची भेट
सुग्रीवाकडून रामाच्या शरकौशल्याची तालवृक्षांचा छेद करुन होणारी परिक्षा व शेजारी वाली सुग्रीव युद्ध
रामहस्ते वालीवध
हनुमानाकडून अशोकवनाचा विध्वंस व राक्षसींचे सीतेला रामाचे तुटलेले मायावी मस्तक दाखवून धमकावणे
हा बहुधा कुंभकर्णवध अथवा रावणवध
रामायणाशिवायही इतरही काही प्रसंग येथे कोरलेले आहेत.
हे बहुधा महाभारतातील भीमाचे गजयुद्ध असावे
हा बहुधा शिव असावा कारण शेजारी नंदी आहे. पण सिंहामुळे प्रसंग कोणता आहे ते समजत नाही.
शिवतांडवाचे प्रसंगही स्तंभांवर कोरलेले आहेत.
शिवतांडव १
शिवतांडव
कलशपूजन करणारे हंस

खालील प्रसंग कुठला ते अजिबातच ध्यानात येत नाही. येथे एका फळावरुन गरुड आणि हनुमानाची ते फळ ओढून घेण्यासाठी जोराची चढाओढ चालू असलेली दिसते. डावीकडे स्वयं विष्णू तर उजवीकडे अश्वमुख असलेला विष्णूभक्त तुंबरु उभा आहे.
पौराणिक शिल्प
स्तंभाच्या खालच्या बाजूसही काही सुरसुंदरी, हरिहर आदींच्या मूर्ती आहेत.
हरिहर
नर्तकी
अभिसारिका आणि तिला त्रास देणारे मर्कट
दर्पणसुंदरी
सभामंडपाच्या छतावरील कोरीव काम व त्यात खुबीने कोरलेले कमळ अतिशय देखणे आहे. आवर्जून बघावे असेच.
छतावरील नक्षीकाम
ह्यानंतर तीन्ही गर्भगृहांच्या प्रवेशद्वारात द्वारपाल, प्रतिहारी यांची शिल्पे कोरलेली आढळतात. गर्भगृहांत शिवलिंगे व भैरवाची मूर्ती आढळते.
गर्भगृहाचे प्रवेशद्वार
ह्यानंतर मंदिराच्या बाह्यभागाचा फेरफटका करुया.एकूण साधीच रचना विशेष असे काहीच नाही. एका ठिकाणी अशाच त्रिदल गाभार्‍याने युक्त असलेल्या मंदिराचा नुसता पायाच आढळतो. इथे मंदिर बांधावयाचे काम राहून गेलेले असावे.
निसर्गाच्या सानिध्यात इतिहासाच्या पाऊल खूणा जपणाऱ्या चंदनवंदन किल्ल्याच्या पायथ्याला असणारे हे पांडवकालीन भैरवानाथाचे मंदीर भारत सरकारने सुमारे ५ कोटी रूपये खर्च करून मंदिर नव्याने जिणोध्दारीत केले आहे. त्याचे मांगल्य पावित्र्य हे किकली देवस्थान ट्रस्ट आणि ग्रामस्थ जपत आहेत. त्यातच वीरगळींचे गाव म्हणून इतिहास संशोधकांनी राज्यातील पहिले गाव म्हणून नामांकन केले आहे.
किकली गावातील वीरगळी : -
       किकली हे वीरांच गाव. पूर्वी कधीतरी कदाचित शिलाहार यादव संघर्षात येथे मोठे धूमशान झालेलं असावं त्याची साक्ष इकडचे शेदीडशे वीरगळ देत आहेत. गावात जिकडे बघावं तिकडे वीरगळाच दिसतात. विहिरीच्या भिंतीला वीरगळ, दुकानाच्या भिंतीपाशी वीरगळ, गटारावर उभे वीरगळ, घरांच्या भिंतीत चिणले गेलेले वीरगळ, गावच्या चावडीवर वीरगळ, पारावर वीरगळ. जिकडे बघावे तिकडे वीरगळच वीरगळ. तेही विविध प्रकारचे. तीन पट असलेले, चार पट असलेले, घोडेस्वारांशी युद्ध, पदातींशी युद्ध, तलवारीने युद्ध, गदायुद्ध. अक्षरश: पारणे फिटते डोळ्यांचे.
खरोखरच वीरांचे गाव, वीरगळांचे गाव, लढावू गाव. पूर्वजांच्या बलिदानाची ही स्मारके अशी भग्नावस्थेत आणि कशीही पडलेली दिसतात.

किकली - सातारा-पुणे महामार्गावर भृगु ऋषींचे समाधीस्थान आहे भुईंज. या गावानंतर एक रस्ता उजवीकडे वंदन किल्ल्याच्या पायथ्याला बेलमाची गावाकडे जातो. या गावाच्या अलीकडे किकली गाव आहे. गावाच्या सुरुवातीलाच भैरवनाथाचे मंदिर आहे. १६-१७ पायऱ्या चढल्यावर मंदिरआवाराचे प्रवेशद्वार आहे. याच्या आत किल्ल्यांच्या प्रवेशद्वारांसारख्या देवड्या आहेत. मंदिराचे आवार स्वच्छ असून मंदिराचा कळस वगळता कोठेही रंगकाम केलेले नाही, त्यामुळे साहजिकच इतर मंदिरपेिक्षा हे मंदिर फिरताना वेगळा आनंद मिळतो. आवारामध्ये भैरवनाथाच्या मंदिराशिवाय आणखी दोन मंदिरे आहेत. ही दोनही मंदिरं उजव्या बाजूस आहेत. यातील मंदिराजवळील पहिले मंदिर भैरवनाथाच्या मंदिराची लहान प्रतिकृतीच आहे. या मंदिराचे जमिनीवरील चौथरे आणि तीनही बाजूला, एकेकाळी गाभाऱ्यात
असणारी तीन शिवलिंगे शिल्लक आहेत. या मंदिराचे खांब अगर सर्व दगड अफजलखानाने, ज्या वेळेस वाईला तळ ठोकला होता त्या वेळेस वाडा बांधण्यासाठी घेऊन गेला असल्याचे समजते. या मंदिराच्या बाजूला, छत नसलेले आणखी एक लहान शिवमंदिर आहे. यावर मात्र बरेचसे कोरीवकाम केलेले आहे.
प्रवेशद्वारातून मंदिराकडे जाताना दोन्ही बाजूला बसण्यासाठी ओटे बांधलेले आहेत. त्यांतील डाव्या बाजूच्या ओट्यावर एक दीपमाळ आणि एक स्तंभ आहे. शिवाय दोन्ही बाजूला एक बसलेला आणि एक उभा दगडी हत्ती आहे. मंदिर-आवाराच्या डाव्या बाजूला जिल्हा परिषदेची शाळा आहे. जवळच आणखी एक लहान मंदिर आहे.
भैरवनाथाचे मंदिर हेमाडपंती पद्धतीचे असून त्याला दोन मंडप आणि तीनही बाजूला एक-एक गाभारे आहेत. त्यातील उजव्या गाभाऱ्यामध्ये भैरवनाथांची काळ्या पाषाणाची मूर्ती महिरपीमध्ये स्थापन केलेली आहे. बाकीच्या दोन गाभाऱ्यांमध्ये शिवलिंग आहेत. मंदिराच्या पहिल्या मंडपामध्ये थोडेसेच नक्षीकाम केलेले आहे. पण त्याच्या बाहेरच्या बाजूने मात्र भरपूर कोरीव काम केलेले आहे. यावरची शिल्पं संगमेश्वर (रत्नागिरी) च्या मंदिराची आठवण करून देतात. यामध्ये नृसिंह, नर्तिका, आलिंगन मूर्ती अशी काही शिल्पं आहेत. या मंडपातून दुसऱ्या मंडपात जाणाऱ्या दरवाज्यावरही सुंदर आणि नाजूक कोरीवकाम केलेले आहे. इथेच उंबऱ्यावर अस्पष्ट झालेले पण वाचता येण्यासारखे 'सिंघणराजा' हे शब्द कोरलेले आहेत. त्यामुळे हे मंदिर सिंघणराजाने बांधले असण्याची शक्यता आहे. दुसऱ्या मंडपामध्ये प्रत्येक खांबावर, तळाशी चारही बाजूला एक-एक मूर्ती कोरलेल्या आहेत. शिवाय खांबांच्या मध्यभागी रामायणातील सुवर्णमृगाची शिकार, राम-रावण युद्ध, अशोकवनातील सीता, वाली सुग्रीव युद्धामध्ये झाडाआडून बाण मारणाऱ्या रामाचे शिल्प, बुद्धांची काही शिल्पं, नजर खिळवून ठेवणारी आहेत. आणखी एक, शेषशायी विष्णूचे शिल्प पाहण्यासारखे आहे.
या मंदिराबद्दल एक विचित्र घटना मला इथे ऐकायला मिळाली. इथे अश्विन महिन्याच्या तिसऱ्या शनिवारी जत्रा असते. जत्रेच्या दिवशी गावातील एका परिट घराण्यामध्ये एका व्यक्तीच्या अंगात येते. त्या दिवशी मंदिरात तीनशे पासष्ट दिवे लावले जातात. आणि ती व्यक्ती, त्या दिव्यावरून उडी मारून, भैरवनाथाच्या गाभाऱ्यासमोर असलेल्या, मंडपातील खांबाला डोक्याने धडक मारते. आणि ते सुद्धा एकदा नव्हे, तर तीन वेळा. तरी त्याला काही होत नाही, हा आश्चर्याचा भाग आहे. या प्रकारानंतर जत्रा सुरू होते.
सातारा-किकली अंतर ३७ कि.मी. आहे. या गावामध्ये खाण्या-पिण्याची मात्र काही सोय नाही.

दातेगड उर्फ सुंदरगड :-

 पाटण या सातारा जिल्ह्यातील गावाच्या नावाबरोबरच आपल्या डोळ्यासमोर उभे राहते ते कोयना नदीचे विस्तीर्ण व हिरव्यागार विविध निसर्गसंपत्तीचा खजिना असलेले खोरे. याच तालुक्याची जीवनवर्धिनी असलेल्या कोयना नदीवरचे "कोयना धरण" आपल्या डोळ्यासमोर येते. महाराष्ट्राच्या कानाकोप-यात असलेल्या उद्योगधंद्यांना, शहरांना, गाव, वाडी, वस्ती या सर्वांना ऊर्जा व प्रकाश पुरविण्याची जबाबदारी समर्थपणे सांभाळणारे कोयना धरण. कोयना खोरे हे सह्याद्रीच्या बामणोली डोंगररांगात वसले आहे.या बामणोली रांगेला एक समांतर डोंगर रांग दक्षिण-उत्तर धावते,तीला 'घेरा दातेगड' रांग म्हणतात. या कोयनेच्या खो-यातील सरदार पाटणकर घराण्याचे शिवकाळातील योगदान, कर्तृत्व, पराक्रम, एकनिष्ठता किती महत्त्वाची होती हे इतिहासाने पाहिले आहे.याच पाटण तालुक्याच्या रक्षणासाठी टेहळणी करणारा टोळेवाडीचा 'घेरा दातेगड' किंवा 'सुंदरगड' आहे. पाटण महालात असलेल्या वसंतगड, गुणवंतगड, भैरवगड, वासोटा, जंगली जयगड व प्रचितगड यांच्या मध्यवर्ती ठिकाणी हा गड उभा आहे.
 दातेगडाचा इतिहास हा सत्ता पालटाचा आहे. स्थानिक लोकांच्या मते हा गड शिवाजी महाराजांनी उभारला असे असले तरी हा गड बहुधा शिलाहारांच्या राजवटीत उभारला गेला असावा.शिवपूर्वकाळात बहामनी राजवटीत कराड चिपळूण या व्यापारी मार्गावर टेहळणी करण्याची जबाबदारी दातेगड सांभाळीत होता. पंधराव्या शतकात दातेगड किल्ला शिर्केंच्या ताब्यात होता. मलिक उत्तुजारने शिर्केंचा पराभव करुन हा गड बहामनी सत्तेत सामील करून घेतला. इ. स. १५२७ मधे बहामणी राज्य नष्ट होऊन अनेक राजसत्तेची निर्मिती झाली व दातेगड आदिलशाहीच्या अमलात आला. दरम्यानच्या काळात पाटणकर ( साळुंखे) घराणे आदिलशाही सेवेत रूजू झाले.  इ. स. १५७२ मधे पाटणकरांचे कर्तृत्व पाहून बादशाहने त्याचवर्षी ज्योत्याजीराव पाटणकर यांना ५०० स्वारांची मनसब दिली व त्यांचे वडील नागोजीराव यांस दातेगडची देशमुखी दिली. १६ व्या शतकाखेर आदिलशाहीच्यावतीने याची व्यवस्था व अधिकार पाटणकर घराण्याकडे होता, मात्र अफ़जलखानाच्या वधानंतर छत्रपती शिवाजी महाराजांनी हा गड जिंकून घेतला.शिवकालात गडावर कचेरी व कायम शिबंदी होती. या शिबंदीकरता गडाशेजारच्या गावातील जमिनी नेमून देण्यात आल्या होत्या. छत्रपती शिवाजी महाराजांनी दातेगड पाहताच त्यांच्या मुखातून पहिला शब्द निघाला तो म्हणजे "सुंदर".त्यामुळे दातेगडास सुंदरगड म्हणून देखील ओळखले जाते, अशी समजुत आहे. याचवेळी आदिलशाहीच्या चाकरीत असलेले सरदार चालुक्यवंशीय घराण्यातील पंचसहस्त्री सरदार चांदजीराव पाटणकर हे छत्रपतींचे झाले, स्वराज्याचे झाले. छत्रपति शिवाजी महाराज, छ. संभाजी महाराज, राजाराम महाराज व पुढील काळात देखील या पाटणकर घराण्याने स्वराज्याची एकनिष्ठ सेवा केली. छ. संभाजी महाराजांच्या निर्घृण हत्येनंतर अनेक मातब्बर घराणी सैरभैर होऊन वतनाच्या लालसेने मोगलांच्या बाजूला गेल्याचे इतिहास पुरूषाने पाहिले आहे, मात्र अशा कठीण प्रसंगी सरदार पाटणकर घराण्याच्या वारसदारांनी स्वराज्याची भक्कम साथ सोडली नाही. छ. शिवाजी महाराजांच्या व छ. संभाजी महाराजांच्या कालखंडात हा किल्ला स्वराज्यातच होता. इ. स. १६८९ च्या दरम्यान काहीकाळ मोंगलांच्या ताब्यात गेला होता, तो धनाजी जाधव व शंकराजी नारायण सचिव यांच्या सैन्याने जिंकून घेतला. सेनापति संताजी घोरपडे यांच्यासह चांदजी पाटणकर यांनी चांगली सैन्य कार्यवाही केली म्हणून छ. राजाराम महाराजांनी २२ सप्टेंबर १६९३ रोजी लिहलेल्या पत्रानुसार पाटण महालातील ३४ गावे इनाम दिल्याचे ऐतिहासिक संदर्भ दिसून येतात. पेशवाईच्या काळामधे पेशवे नानासाहेब व तुळाजी आंग्रे यांच्यात बेबनाव झाल्यामुळे तुळाजीने सुंदरगड उर्फ घेरा दातेगडला वेढा घालून किल्ल्याची रसद खंडित केली, मात्र तो जिंकून घेता आला नाही. इ. स. १८१८ च्या मे महिन्यात कॅप्टन ग्रँट डफ हा इंग्रज अधिकारी हा किल्ला घेण्यासाठी गेला असताना, किल्ल्यावरील अधिकारी व्यक्तीने डफला निरोप दिला की, तुमच्या लोकांनी आमचे पाच घोडे धरून नेले आहेत, ते परत द्यावे आणि आमच्या सैनिकांची हत्यारे व सामान सुरक्षितपणे घेऊन बाहेर पडण्यास अडथळा होणार नसेल तर किल्ला तुमच्या ताब्यात देतो. कॅ. डफने या दोन्हीही अटी मान्य केल्या आणि फक्त पाच घोड्याच्या मोबदल्यात कोणतीही लढाई न करता हा दातेगड ब्रिटिश सरकारच्या ताब्यात घेतला हे उभ्या महाराष्ट्राचे दुर्दैवच ना ?     
कसे जाल ?
  या गडावर जायचे तर दोन मार्ग आहेत.
१) स्वताचे वाहन असेल तर- सातारा जिल्ह्यातील कराड-चिपळूण रोडवरील पाटण शहरातून एक रस्ता चाळकेवाडी पठाराकडे जातो.
 या डांबरी रस्त्याने प्रवास करताना जवळपास सर्व डोंगर चढून आलो कि भैरवनाथ पोल्ट्री फार्मजवळून एक रस्ता दक्षिणेकडे दातेगडकडे जातो तर एक रस्ता वळून उत्तरेकडे चाळकेवाडी पठाराकडे जातो.
हा कच्चा गाडी रस्ता आहे,त्यामुळे पावसाळ्यात या रस्त्याने टाळलेले बरे.जीपसारखे वाहन किंवा बाईक घेउन आपण थेट गड पायथा गाठू शकतो.
२) दुसरा मार्ग अर्थातच डोंगरभटक्यांसाठी. पाटण शहरातून कोयनेच्या दिशेने चालत निघाले कि ज्ञानोजीराव साळुंखे हायस्कुल लागते.ईथून रस्ता उजवीकडे म्हणजे उत्तरेकडे वळतो.इदगाह मैदान आणि पाटण जलशुध्दीकरण केंद्राजवळून एक पाउलवाट समोर दिसणार्‍या टेकडीवरील दर्ग्याकडे जाते. टेकडीच्या अर्ध्या उंचीवर हा दर्गा आहे.ईथून वाट तशीच रमतगमत टेकडीच्या माथ्यावर दिसणार्‍या मोठ्या आंब्याच्या झाडाच्या दिशेने चढते. या वाटेने पठारावर आलो कि दोन्हीकडे शेती दिसते.समोरच एक डोंगर आणि त्याच्या पायथ्याशी वस्ती दिसते.
हा डोंगर दातेगड वाटला तरी प्रत्यक्षात दातेगड या डोंगराच्या मागे लपला आहे. हि वस्ती म्हणजे बौध्दवाडा. तसेच पुढे चालत निघाले कि टोळेवाडी लागते.ईथेच आपल्याला दातेगडाच्या डोंगराचे आणि त्याच्या चौथर्‍यासारख्या कड्यांचे दर्शान होते. आजूबाजूच्या निसर्गाच्या सानिध्यामुळे आपण कधी टोळेवाडीत येऊन पोहोचतो ते लक्षात देखील येत नाही. टोळेवाडी म्हणजे वीस पंचवीस लाल मातीच्या भिंती व तीव्र उताराच्या छप्परांची लहान घरे असलेली ग्रामीण लोकवस्ती. येथील रस्त्याच्या कडेला असलेल्या गोलाकार दगडी बांधकामातील विहिरीच्या रहाटावर माता भगिनी पोहरा बांधून पाणी काढताना हमखास दिसतात. त्यांच्या पोह-यातील पाण्याने हात, पाय व तोंड धुऊन हाताची ओंजळ करून पाणी पिऊन ताजेतवाने व्हायचे. लाल मातीच्या गाडीरस्त्याने काही अंतर गेल्यावर डाव्याबाजूस संपूर्ण काळ्याकातळाची नैसर्गिक तटबंदी असलेला दातेगड आपणांस आकर्षित करतो. पायथ्याशी एक नवीन लहान इमारत बांधलेली असून त्याच्या शेजारच्या वाटेने दोन वळणे चढल्यावर झाडाझुडुपातील अर्धवट पायऱ्या असलेल्या वाटेने सुमारे दहा मिनिटांत आपण गडमाथ्यावर पोहोचतो. आयताकृती किल्ल्याचा आकार आटोपशीर असल्याने संपूर्ण किल्ला एका नजरेत दिसून येतो.  पाटणमधून निघाल्यापासून दोन तासात आपण गडापाशी पोहचतो. 
    साधारण आग्नेय-वायव्य असा विस्तार असलेल्या या गडावर पूर्वेकडील दरवाजाचे अवशेष देखील राहिले नाहीत तिथे डागडूजी सुरू आहे.गडाच्या पश्‍चिम बाजूस भग्न प्रवेशद्वार आहे.या बाजूस जाण्यासाठी पश्‍चिम तटाजवळील कातळात खोदलेल्या तीस पायऱ्या आहेत.
तसेच दक्षिणेकडील बाजूच्या दगड गोट्यातील पायवाटेने आपण किल्ल्यावर पोहोचतो.गडाचे क्षेत्रफळ दोन हेक्‍टर आहे तर उंची समुद्रसपाटीपासून सुमारे ३४२५ फूट आहे. लांबून हा गड बघताना एक चौथरा वाटतो. गडावर प्रवेश करण्याचा मार्ग आणि पाण्याची टाकी कोरुन काढलेली आहेत.
   किल्ल्याच्या मध्यभागी असलेल्या खोलगट भागातील तलवारीच्या आकाराची विहीर व पश्चिमेस असलेल्या किल्ल्याच्या प्रवेशद्वाराच्या खडकात खोदलेल्या पायऱ्या दिसून येतात. 
भल्यामोठ्या सुमारे चाळीस पायऱ्या उतरत असतानाच समोरील कातळातील श्री गणेशाचे दर्शन होते. डाव्या सोंडेची गणेशाची सहा फूट कातळात कोरलेली मूर्ती सर्वांग सुंदर असून मूर्तीचे कान हे जास्वंदीच्या फुलांच्या पाकळी समान भासतात. मांडी घातलेल्या मूर्तीच्या पोटावर नागाची प्रतिमा कोरलेली असून पायात मोठा वाळा घातल्याचे शिल्प कोरले आहे. 
शेवटच्या चार पाच पायऱ्या राहिल्यावर उजव्या हाताला कातळात खोदलेली एक लहान खोली दिसून येते. 
गणेशमूर्तीच्या काटकोनात असलेल्या कातळावर दक्षिणाभिमुखी आठ फूट उंचीचे हनुमानाचे रेखीव शिल्प कोरलेले आहे.
 उभ्या असलेल्या हनुमान शिल्पाच्या पायाखाली दुष्कर्माचे प्रतिक असलेल्या राक्षसाचे मर्दन केलेले दिसून येते. मूर्तीची शेपटीची डोक्यावर अर्धवर्तुळाकार कमान तयार झाली आहे, तर उजवा हात वर केलेला असून डावा हात कमरेवर स्थिरावला आहे. या किल्ल्याच्या दोन दरवाजापैकी सुस्थितीत असलेला हा एकमेव भव्य दरवाजा तत्कालीन वैभवाचे उदाहरण म्हणावे लागेल. 
 पुर्वी या हनुमान आणि गणेश शिल्पाची दुरावस्था होती.मात्र दुर्गसंवर्धन करणारे हात ईथे वळाले आणि या दोन्ही मुर्तींना जणु नवसंजीवनी लाभली.
तीस भव्य पायऱ्या चढून आपण वर येत असताना डाव्या बाजूच्या कातळात खोदून तयार केलेली दोन भुयारी दालणे आढळून येतात. 
 इ. स. १९६७ साली झालेल्या भूकंपाने दरवाजाची बरीच नासधूस झाली असावी.  दरवाजाची कमान जांभ्या दगडातील आहे. वास्तविक काही वर्षापुर्वी हि कमान झाडांच्या वेलीत्,दाटीत लपून गेली होती,या दरवाज्याने वावरणे शक्य नव्हते.पण टीम दातेगडच्या कामाने या दरवाज्याने मोकळा श्वास घेतला.दरवाजाच्या आतील दोन्ही बाजूला सैनिकांसाठी खडकात कोरलेल्या देवड्या आहेत. दोन्ही बाजुला असलेल्या पहारेकर्‍यांच्या देवड्याही वैशिष्ट्यपुर्ण आहेत. 
या बाजुला बहुधा सावलीसाठी आणि उन्हा,पावसापासून संरक्षण म्हणून तिरके उतरते कौलारु छत असावे.त्या छताला आधार देणारी कोरीव खाच आजही भिंतीत पहाता येते.
ऐतिहासिक वैभवाची साक्ष पाहून आपण पायऱ्या चढून आल्यावर त्याच्या शेजारीच अतिशय खोल अशी चौकोनी विहीर खोदलेली 'तलवार' आहे. या विहिरीत उतरण्यासाठी पायऱ्यांचा जो मार्ग आहे तो मराठा तलवारीच्या पात्याच्या आकाराचा आहे. प्रत्येक गडाचे काही ना काही वैशिष्ट्य असते.दातेगडावर खडकात खोदलेली विहीर हेच एक बघण्यासारखे विशेष आहे 
  दक्षिणोत्तर तलवार विहीर ५० मिटर लांब, ३ मिटर रुंद तर ३० मीटर खोल असून आत जाण्यासाठी विहिरीस एकूण ४४ पायऱ्या आहेत. यातील काही पायऱ्या तुटलेल्या आहेत.विहिरीच्या पायऱ्या खोदकाम करताना युगशिल्पी कारागीराने मोठ्या कल्पकतेने डाव्याबाजूच्या कातळात एक गजशिल्प कोरलेले दिसून येते.
 शेवटच्या चार पाच पायऱ्यांच्या डाव्याबाजूस खडक खोदून तयार केलेले ७ फूट रुंद, ७ फूट लांब व ७ फूट उंचीचे शंभू महादेवाचे मंदिर असून आतमधे महादेवाची पिंडी तर बाहेरील बाजूस सुरेख नंदीशिल्प आहे. 
तेथून वर आकाशाकडे पाहिल्यास आपणांस तलवारीचा आकार सहज दिसून येतो. विहिरीतील पाणी उपसा न झाल्याने व आजूबाजूची माती, पालापाचोळा गेल्याने अस्वच्छ आहे. कधीकाळी या विहिरीने या किल्ल्यावरील अधिकारी व सैनिकांची तहान भागवविली असणार यात दुमत असू शकत नाही. विहिरीच्या उजव्याबाजूस पावसाळी पाणी साठवणूक करणारे लहान टाके असून यातील पाणी विहिरीत पाझरत असावे. जि विहीर बघता कमळगडावरची विहीर आणि दातेगडावरची हि विहीर याच्यात साम्य जाणवते.हे दोन्ही एकाच कालखंडात उभारले असावेत हे निश्चित.  
तेथून पश्चिमेकडील बुरूजाकडे जाताना खडकात खोदून चौकोनी इमारती निर्माण केलेल्या असल्याचे अवशेष आहेत.  
आता मात्र खडकात सुमारे ८ फूट खोलीच्या असलेल्या अवशेषांबाबत वेगवेगळे मतप्रवाह आहेत.  
जवळच्या पृष्ठभागावर असलेल्या काळ्या कातळात वळणदार आकारात मानवनिर्मित लहान रूदींची पण खोल भेग आढळून येते. नैसर्गिक तटबंदी लाभलेल्या पश्चिम बुरूजावरून लहानमोठी खेडी, डोंगररांगांचे विलोभनीय दृश्य दिसते.  
समोरच पुर्वेला सडा वाघापुरचे पठार दिसते. 
या किल्ल्याहून दक्षिणेकडे असलेला मोरगिरी (गुणवंत गड) व कोयनेचा प्रवाह दिसून येतो.
 पावसाळा सरताना या गडावर आल्यास एक अनोखा नजारा दिसतो.गवताची हिरवीगार चादर पांघरलेला गडावर सोनकीच्या पिवळ्या फुलांचा जणु भंडारा उधळलेला असतो.
          शिवकाळाचा साक्षीदार असलेला दातेगड आपणांस इतिहासात नक्कीच घेऊन जातो. या किल्ल्याच्याबाबत इतिहासात विशेष घटना घडल्याची नोंद नसली म्हणून काय झाले? या सह्याद्रीतील किल्ल्यांनी स्वराज्य निर्माण केले, वाढविले व टिकविण्यासाठी दिलेले योगदान काळ पुरूषाने पाहिले आहे. अशा या दातेगडला नक्कीच एकदा भेट द्या, तो तुमच्याशी हितगुज करण्यासाठी कायमच उत्साही आहे.

शिरवळची प्राचीन पाणपोयी :-    

   पुण्याहून सातार्‍याला येताना निरानदी ओलांडली की सातार्‍याची हद्द सुरू होते. तिथून पुढे उजव्या बाजूला नायगाव फाट्यावर मोडकळीस आलेल्या मंदिरासारखी वास्तू दिसते. दुर्दैवाने ते मंदिर नसून ती पाणपोई आहे. पाषाणात कोरेलेली ही पाणपोई सुमारे हजार ते बाराशे वर्षे जुनी असून, संवर्धनाअभावी ढासळण्याच्या मार्गावर आली आहे.
     सातारा जिल्ह्याला ऐतिहासिक वारसा लाभला असून, आजही अनेक पुरातन वास्तू, मंदिरे, शिल्प इतिहासाची साक्ष देत उभ्या आहेत.
त्यापैकी एक असलेली शिरवळजवळील पाषाणात कोरलेली पाणपोई. ही पाणपोई सुमारे हजार ते बाराशे वर्षांपूर्वी ‘जकात पिव्हई’ म्हणजे जकात नाक्यावर केलेली असावी. अखंड पाषाणात कोरलेले दोन खांब, त्यामागे घडवलेले मोठे पाषाण एकमेकांवर रचून खोली तयार केली आहे. छतही एकमेकांवर दगडी रचून तयार करण्यात आले आहे. आतमध्ये जमिनीशी समतल दोन रांजण असून ते दगडी आहेत. हे सारे बांधकाम ‘शुषकसांधा’ पद्धतीचे म्हणजे कोणतेही चुना वा सिमेंट सारखे पदार्थ न वापरता करण्यात आले आहे.
   अठराव्या शतकात खंबाटकीच्या खांबटाक्यापासून ते सिंहगडाच्या दरम्यान शिवपर्वानंतर मराठयांनी गनिमांशी बावीस वेळा लढाया केल्या. रावजी पंत चिटणीसांच्या बखरीत या लढायांचे बरेचसे वर्णन आले आहे. तंजावर आणि बेंगलोरच्या मराठी सदरे वर जाताना सैनिकांच्या मोहिमांसाठी शिरवळ गावाच्या हद्दीवर पाणपोई उभारण्याची सूचना दस्तुरखुद्ध श्रीमंत नानासाहेब पेशवे यांनी केली होती. या पाणपोईला सव्वादोनशे वर्षाचा इतिहास असून या पाणपोईची रचना ही हेमाडपंती देवळाच्या धर्तीवर करण्यात आली आहे. या पाणपोईसाठी पगारी सेवक ठेवले जात असत. या पाणपोईत चार हंड्यांची व्यवस्था होती. सातारा-नायगाव-सारोळा-धांगवडी-कामथडी येथे पाणपोयांची रचना अस्तित्वात होती. मात्र शिरवळ हद्दीतील हेमाडपंती शैलीची ही पाणपोई मात्र व विशेष रचनेमुळे येणाऱ्या जाणाऱ्याचे लक्ष वेधून घेई. मात्र हा ऐतिहासिक ठेवा आज देखभालीअभावी दुर्लक्षित आहे.
     सदर पाणपोईची रचना व त्याच्या व्यवस्थेच्या आदेशाबाबतचे लेखी पत्र नानासाहेब पेशवे यांनी शिरवळच्या सरदारांना धाडले होते. ते पत्र प्राध्यापक सचिन जोशी यांच्या संग्रहात आहे. या पाणपोई च्या बांधकामासाठी दगड गूळ, चुना, हरभरे, इ. साहित्य पुण्यावरून शिरवळला रवाना करण्यात आल्याचा ऐतिहासिक संदर्भ आहे. पुरातन पाणपोई कोणत्याही प्रकारचा चुना अथवा सिमेंटसारखे पदार्थ न वापरता केवळ गुरुत्वबल वापरून उभारण्यात आली आहे. त्यातील एखादा दगड जरी पडला तरी ही वास्तू पुन्हा आहे तशी उभारणे अवघड आहे. या पाणपोईच्या दगडी एकमेकांपासून वेगळ्या होण्यास सुरुवात झाली आहे.
       पुणे-बेंगलोर महामार्गाच्या सहापदरीकरणाला या पुरातन वास्तूचा अडथळा निर्माण होत आहे. त्यामुळे रस्त्याचे रुंदीकरण करताना या पाणपोईच्या भोवतालीच खोदकाम करून रस्ता तयार करण्यात आला आहे. या खोदकामामुळे पाणपोईची दगडी ढासळण्याची चिन्हे निर्माण झाली आहे. पुणे-सातारा महामार्ग सहापदरीकरणाचे काम झटपट उरकण्याच्या तयारीत रस्ते विकास महामंडळ असून ही पाणपोई अगदी रस्त्यातच आली आहे. महामार्गावर विनाकारण अपघात नको म्हणून ही पाणपोई हटवण्याची सुप्त गडबड कानांवर गेल्याने शिरवळ ग्रामस्थ संतप्त झाले आहेत. या वास्तूचे संवर्धन व्हावे या मागणीसाठी रायरेश्वर प्रतिष्ठान शिरवळ व गड किल्ले संवर्धन समितीने विशेष प्रयत्न सुरू ठेवले आहेत. पुरातत्व खात्याच्या परवानगीनंतर या पाणपोईच्या रेखांकनाचे काम प्रतिष्ठानच्या वतीने नुकतेच पूर्ण करण्यात आले. डेक्कन कॉलेजचे प्राध्यापक सचिन जोशी व वास्तूविशारद राहूल चेंबूनकर यांच्या सहकार्याने हे रेखांकन करण्यात आले असून याचा अहवाल राज्यसरकारकडे सादर करण्यात आला आहे. त्यानंतर या वास्तूची पुनर्बांधणी करण्याचा प्रस्ताव सादर करण्यात येणार आहे.
      धर्मशाळा बांधणे, पाणपोया उभारणे या संकल्पना कालबाह्य होत चालल्या आहे; पण मानवतावादी, सांस्कृतिक वारशाची साक्ष देणाºया वास्तू वाचविल्या पाहिजेत. त्यामुळे पुढच्या पिढीला किमान त्याची तोंडओळख तरी होईल.

संतोषगड -

सीतामाईच्या डोंगररांगेमध्ये, एका, पुढे आलेल्या डोंगराच्या सोंडेवर संतोषगड किल्ला बांधलेला आहे. या किल्ल्याच्या इतिहासाबद्दल फार नोंदी नसल्या तरी हा किल्ला शिवाजीराजांनी, वारुगडाबरोबरच बांधला असल्याचं समजतं. पायथ्याशी असणाऱ्या ताथवडा गावामुळे याला ताथवडा किल्ला हे-देखील नाव आहे.
ताथवडा गावामध्ये बालसिद्ध महादेव, राम, विठ्ठल-रुक्मिणी आणि शिवमंदिर अशी काही मंदिरं आहेत. यांतील बालसिद्ध महादेव मंदिर आकाराने त्रिकोणी असून मंडपाच्या पायरीवरील शिलालेखानुसार १७६२ साली, विसाजी शामराव देशपांडे याने, या मंदिराचा जीर्णोद्धार केलेला आहे. पण अलीकडेच याचा पुन्हा जीर्णोद्धार करून, त्याला अनेक वेगवेगळे रंग लावलेले आहेत. मंदिराची मूळ वास्तू रंगविलेली असून पाहण्यासारखी आहे. तटबंदीमध्ये असणाऱ्या मंदिरासमोर पितळी पत्र्याने मढविलेला नंदी आहे. आवारात दोन दीपमाळाही आहेत.
पण या ठिकाणी मुख्य आकर्षण आहे ते म्हणजे संतोषगड आणि त्यावरील तातोबा महादेव मंदिर, ताथवडा गावापासून २५-३० मिनिटांत तटबंदीच्या पायथ्याशी असणाऱ्या गुहेतील मठाजवळ जाता येतं. या ठिकाणी काही साधूमहाराज मुक्कामास आहेत. पूर्वी इथे एक स्वामी साधनेसाठी राहत असल्याचं त्यांच्याकडून समजतं. मठामध्ये महिषासुरमर्दिनीची अत्यंत सुंदर मूर्ती आहे. या कड्यालगत, मठाजवळ, थोडं खालच्या बाजूस, डावी-उजवीकडे तीन गुहा आहेत. त्यांतील एका गुहेमध्ये एक ओबड-धोबड मूर्ती आहे. ती वाल्मीकी ऋषींची असल्याचं सांगतात. मठाच्या उजवीकडच्या गुहेमध्ये पिण्याच्या पाण्याची सोय होऊ शकते. पण त्यामध्ये साप, खेकडे असल्यामुळे स्थानिक पुजारी तेथे कोणास जाऊ देत नाहीत. या गुहेत जायला मिळाल्यास, छतावर पिवळ्या रंगाच्या कुल्पीसारख्या कांड्या लटकलेल्या दिसतात. छतामध्ये असणाऱ्या चुनखडीच्या दगडातून पावसाळ्यात पाणी पाझरल्यामुळे या तयार होतात. यांना अधोमुखी लवणस्तंभ म्हणतात. या ठिकाणी बॅटरी घेऊन
जाणे मात्र आवश्यक आहे. बॅटरी असल्यास गुहेत उजव्या बाजूला काही अंतरावर एक शिवलिंग आहे ते पाहता येते.
याच वाटेने परत किल्ला डावीकडे ठेवून एक वाट, वरती, किल्ल्याच्या माथ्याकडे जाते. काही अंतर गेल्यावर समोर एक मोठी भिंत आणि उजवीकडे एक दरवाज्याची गोल कमान आहे. काही अंतरावर पुढे एके ठिकाणी दगडाची रास पडलेली दिसते. ही, महादरवाज्याची आणि त्याजवळील बुरुजाची आहे. या ठिकाणी फक्त महादरवाज्यातील डाव्या बाजूची देवडी शिल्लक आहे. समोरच छत नसलेले हनुमान मंदिर आहे. स्थानिक लोक त्याला दासानुदास हनुमान म्हण्तात. इथून गडाच्या उजव्या बाजूने फिरायला सुरुवात केल्यास समोर, एकावर एक ठेवलेले तीन मोठे दगड दिसतात. बाजूला, खाली मोठे दोन बुरूज आणि त्यामधील तटबंदी लक्ष वेधून घेते. डाव्या बाजूला एक मोठे टाके बांधलेले आहे. या बाजूस झाड असल्यामुळे, टाक्यास निम्मा वळसा घालून धान्य कोठाराच्या बाजूने जावे लागते. त्या ठिकाणी पोहोचल्यावर त्याचं केलेले बांधकाम आश्चर्यचकित करायला लावणारं आहे. साधारण सात मीटर लांब आणि नऊ मीटर रुंद असणाऱ्या टाक्यामध्ये एका बाजूला, अखंड बांधलेला पूल आहे. त्याच दगडामध्ये एका टोकाला तातोबा मंदिर आहे. हे अशा प्रकारचं बांधकाम कशासाठी केलेलं आहे ते मात्र समजत नाही. पावसाळ्यात ही वाट निसरडी असते. त्यामुळे पावसाळा संपल्यावर काही काळाने आल्यास मंदिरापर्यंत जाता येऊ शकते. मंदिरामध्ये शिवलिंग आणि नंदी आहेत. पायऱ्यांच्या बाजूने, पुलाच्या डावीकडून टाक्याच्या तळापर्यंत जाण्यासाठी पायऱ्या खोदलेल्या आहेत. त्या, उजवीकडे वळसा घालून, मंदिराच्या खालील कमानीतून तळापर्यंत जातात. यांना पाहण्यासाठी मात्र उन्हाळ्यात येणं आवश्यक आहे. माझ्या आत्तापर्यंतच्या भटकंतीमध्ये, मला अशा प्रकारचं बांधकाम कोठेही पाहायला मिळालेलं नाही. त्यामुळे हे, या गडाचे वैशिष्ट्य आहे असं मी म्हणेन.
या वास्तूंशिवाय गडावर अन्य कोणत्याही वास्तू पाहण्यासारख्या नाहीत. इथे गवत उंच वाढलेले असल्यामुळे गड फिरताना काळजी घेणे आवश्यक आहे.
संतोषगडाच्या प्रवासामध्ये फलटण, दहिवडी ही गावे सोडल्यास खाण्या-पिण्याची सोय नाही. शिवाय गडावर पिण्याच्या पाण्याची सोय होऊ शकते तरी पाणी बरोबर घेऊन जाणे सोयीचे ठरेल.
सातारा - संतोषगड अंतर (ललगुणमार्गे) ५६कि.मी. आहे.
 संतोषगड
महाराष्ट्राचे देश व कोकण असे दोन भौगोलीक भाग करण्यात दक्षीणोत्तर पसरलेल्या सह्याद्रीचा मोठा  वाटा आहे. या सह्याद्रीला पश्चिमेला कोकाणात आणि पुर्वेला देशावर डोंगररांगाचे फाटे फुटलेत. अजंठा-सातमाळा, हरिश्चंद्र-बालाघाट, सेलबारी-डोलबारी अशा काही यातील प्रमुख रांगा. अशीच आणखी एक रांग दक्षीण महाराष्ट्रात सातारा जिल्ह्यात आहे. या रांगेच्या शेवटी शिखरांच्या राजाचे शंभु महादेवाचे "शिखर शिंगणापुर" हे देवस्थान आहे. यामुळे या रांगेला "शंभु महादेव डोंगररांग" म्हणतात. प्रतापगडापासून उगम होउन महाबळेश्वराला वंदन करुन हि रांग पुर्वेकडे शंभु महादेवाचे दर्शन घेण्यासाठी धावते.पुढे या रांगेला तीन उपरांगा फुटतात,  शंभूमहादेव रांग, बामणोली रांग आणि म्हसोबा रांग. यापैकी म्हसोबा डोंगररंगेवर संतोषगड, वारुगड, महिमानगड आणि वर्धनगड हे किल्ले आहेत. आपल्याला या पावसाळी भटकंतीत यांचीच ओळख करुन घ्यायची आहे.
        अत्यंत कमी पाउस आणि दुष्काळी प्रदेश अशी अपकिर्ती पसरलेला हा प्रदेश आताशी कात टाकतो आहे. उरमोडीच्या व धोम बलकवडीच्या पाण्यामुळे आता हळूहळू समॄध्दी येते आहे. आधी केवळ डांळीबांच्या मळ्यावर जगणारा शेतकरी इथल्या कसदार जमीनीत ऊसाच्या शेती करु लागला, त्यामुळे सर्व परिसर सधन झालेला आहे. माणदेशी मातीची आणि इथल्या माणसांची खरी ओळख करुन द्यायचे श्रेय सुप्रसिध्द लेखक व्यंकटेश माडगुळकर उर्फ तात्यांना जाते. अर्थात बनगरवाडीत वर्णन केलेली स्थिती आता राहिली नसली, तरी "माणदेशी माणसे" मात्र तुम्हाला अजून भेटतील हे नक्की.
   ( संतोषगड उर्फ ताथवड्याचे हवाई प्रकाशचित्र )
 इथली भटकंती शक्यतो पावसाळ्यात केलेली उत्तम. इथल्या एन उन्हाचा कडाका बाहेरच्या लोकांना सहन होण्यासारखा नाही. पाउस तसा जेमतेम भिजवून जातो. एन आषाढात रिमझिंम पाउस असतो तर परतीचा पाउस इथल्या जमीनीची तहान पुढच्या जेष्ठापर्यंत भागवून जातो. म्हणजेच एन आषाढात पाउस नसला तरी ढगांची सावली इथली वणवण सुसह्य करते. सातार्‍या जिल्ह्याचा पुर्व भाग म्हणजे खटाव व दहिवडी तालुका हे दोन्ही तालुके १०० मीटर उंच पठारावर वसलेत. त्यामुळे सहाजिकच दक्षिणेकडे कराडला जायचे असो, पुर्वेकडे पंढरपुर असो, पश्चिमेला कोरेगाव, सातार्‍याला जायचे असो वा उत्तरेला फलटण तालुक्यात उतरायचे असो, घाट चढण्याशिवाय किंवा उतरण्याशिवाय पर्याय नाही. या पठाराच्या उत्तर बाजुच्या कडेला असलेल्या डोंगररांगेत माणदेशी दुर्गचौकडी खडी आहे. यातील मोळ घाटावर पहारा करणार्‍या "संतोषगड उर्फ ताथवडा" या गडापासून या भ्रमंतीला सुरवात करुया.
एका अशाच सवडीच्या दिवशी मी या संतोषगडाचा प्लॅन केला. इथे जायचे तर दोन पर्याय होते.
१ )  ताथवडे हे किल्ल्याच्या पायथ्याचे गाव आहे. ताथवडेला अनेक मार्गांनी पोहोचता येते. फलटण ते ताथवडे अशी एस टी सेवा दर अर्ध्या तासाला उपलब्ध आहे. फलटण ते ताथवडे हे साधारण १९ किमी चे अंतर आहे. पुणे-मुंबईवरुन यावयाचे झाल्यास आधी पुणे-सासवड-जेजुरी-नीरा-लोणंद-फलटण यामार्गे किंवा पुणे-बेंगळुरू हायवेने शिरवळाला जाउन तेथून लोणंदमार्गे फलटण गाठता येते. फलटणला येउन नंतर ताथवडे गाठणे सोयीचे आहे.
२ ) सातार्‍याहून  सेवागिरी महाराजांमुळे प्रसिध्द झालेल्या पुसेगाव मोळघाटमार्गे फलटणला जाणार्‍या बसने ताथवडे गावाच्या फाट्याला उतरता येते. पुसेगाव ते ताथवडे हे साधारण २३ किमी चे अंतर आहे. सातारा- पंढरपुर रस्त्यावर पुसेगाव असल्याने पुसेगावला भरपुर बस आहेत.
   मी मात्र बाईकवरुन पुसेगाव गाठले आणि बुध, ललगुण अशी गावे मागे टाकीत अखेरीस मोळ घाट उतरायला सुरवात केली. मोळ घाटातून एका वळणावर महादेव डोंगररांगेतून बाहेर आलेल्या संतोषगडाचे दर्शन झाले. पायथ्याचे ताथवडा गाव मात्र पुसेगाव-फलटण रस्त्यावरुन  साधारण १ कि.मी. आत आहे. रस्त्यावरुन साधारण समुद्रसपाटीपासून २९६५ फुट उंचीचा (  ९०६ मी ) पण पायथ्यापासून जेमतेम २०० मीटर उंचीचा गड समोर दिसु लागला.
   एन जुलै असल्याने आजुबाजुला थोडी हिरवळ होती, त्याने परिसर थोडाफार तरी सुसह्य वाटत होता, नाहीतर तसा हा भाग वैराणच.
एखादे टिपीकल माणदेशी गाव असावे तसेच हे ताथवडे आहे. गावाच्या मध्यभागी बालसिध्द शंकराचे प्रशस्त मंदिर दिसते.
 हे प्राचिन महादेवचे मंदिर प्रेक्षणीय असुन याचा नगारखाना अंदाजे १५ मीटर उंच आहे. मंदिराचे प्राकार प्रशस्त असून मंदिराच्या गाभार्‍यावर असलेल्या कळसामधे तालीम आहे. ( म्हणजे कळस आतून पोकळ असून त्यात तळाशी माती असते. हा प्रकार मी अनेक देवस्थानात पाहिला आहे, मात्र याचे कारण समजत नाही )
 मंदिराच्या गाभार्‍याच्या पायथ्याला एक शिलालेख आहे. त्याचे वाचन पुढीलप्रमाणे आहे. "चरणी सादर विसाजी शामराव देशपांडे मो | फलटण देहे सांवधरा शिव कसबे ताथवडा शके १६४८ चैत्र भानु संवत्सर जेष्ठ शुध्द पंचमी" याचा अर्थ "ताथवडे गावातील प्रमुख देउळ बालसिध्दाचे. इ.स. १७६२ मध्ये विसाजी शामराव देशपांडे नामक कोणा सदगृहस्थाने या प्राचीन देवस्थानाचा जीर्णोध्दार केला.
मंदिराजवळ एक दगडी दिपमाळ असुन या मुख्य मंदिराबरोबरच याच्या शेजारी रामाचे, विठ्ठल-रखुमाईचे व शिव मंदिर आहे.
शिव मंदिरातील पिंडीवर शाळुंखेत चौमुखी शिव कोरलेले आहेत.बालसिध्द म्हणजे शंकर अर्थात अष्टभैरवापैकी एक. त्याची मुर्ती शैवपंथीयांच्या संकेतानुसार आहे. दर चैत्र वद्य अष्टमीला येथे यात्रा भरते.
    बालसिध्दाचे दर्शन घेउन मी गडाकडे निघालो. ताथवडा गावातून सोपी पायवाट गडावर घेऊन जाते. सध्या या वाटेवर सह्याद्रीत आढळणार्‍या वेगवेगळ्या पक्ष्यांचे फलक लावले आहेत. तसा संतोषगड हा "बेलाग, बुलंद, राकट, कणखर" वैगेरे "टिपिकल" सह्याद्रीच्या विशेषणांच्या खात्यात जमा न होणारा होता. त्रिकोणी आकाराचा हा गड तीन टप्प्यांचा बनलेला आहे.  पहिल्या टप्प्यावर सरंक्षक तटबंदी तर दुसया टप्प्यावर माचीचा भाग आणि सर्वात वरचा बालेकिल्लाचा भाग आहे.
 सह्याद्रीचे उंचच उंच किल्ले चढल्यानंतर या गडाची चढण तशी मॉर्निंग वॉकला दमायला होईल तितपतच आहे. खरेतर ह्या गडाच्या पायथ्याशी गाव असूनही गावकर्‍यांच्या अनास्थेमुळे गडाची दुर्दशा झाली होती. पण हळूहळू आपल्या या अबोल मानकर्‍यांचे महत्व समजल्याने बर्‍याच गडावर दुर्गसंवर्धन सुरु झाले आणि याही गडावर पुण्याच्या शिव सह्याद्री संस्थेची पावले वळाली आणि ईथले रुपडे पालटून गेले आहे. या धाग्यात त्यांच्या कार्याविषयी लिहीणारच आहे.
गडावर चढाई करताना वाटेत हि मंदिर व काही घुमट्या नजरेला पडतात. वर चढणार्‍या वाटेवर वनखात्याने परिसरात दिसणार्‍या प्राण्यांचे आणि पक्ष्यांचे फोटो लावले आहेत.
      पंधरा वीस मिनिटांच्या चढाई नंतर एक पायवाट उजवीकडे वाळलेली दिसली. मठाच्या पुढे तीन गुंफा आहेत.  वाटेवरून चालत गेलो असता मी एका मानवनिर्मित गुहे जवळ जाऊन पोचलो.
ही गुहा म्हणजे एक खांबटाकं आहे. सुरुवातीच्या दोन खांबांवर द्वारपाल कोरलेलेआहेत. आत गेल्यावर खोली वाढत गेली. खाली जायला कोरलेल्या पायऱ्या आढळून आल्या. सध्या गुहेमध्ये गणपतीची मूर्ती आणि शिवलिंग ठेवलेले आहे. पाणी मात्र नाही.
     गुहा बाजूला ठेऊन पुन्हा मुख्य पायवाटेला आलो आणि दोन मिनिटात एका आश्रमापाशी पोचलो. येथील माताजी दत्ताच्या भक्त असून सुमारे चाळीस वर्षांपासून येथे राहत आहेत अशी माहिती मिळाली. आश्रमामधे महिषासुरमर्दिनीची सुंदर मुर्ती आहे. आश्रमाजवळ एक छोटे मंदिर आहे, जेथे दत्त व लक्ष्मी मातेच्या प्रतिमा ठेवल्या आहेत.
 मठाच्याच वरच्या बाजूला एक दरवाजा आहे. मात्र येथपर्यंत पोहोचण्यासाठी वळसा घालून यावे लागते. मठाच्या डाव्या बाजूला जाणारी वाट तटबंदीला चिटकूनच पुढे जाते.
पुढे वाटेतच एक छोटेसे देऊळ लागते. देवळातील या मुर्तीला वाल्मिकीची मुर्ती समजतात. येथून वर थोडी उजवीकडे सरकत जाणारी वाट आपल्याला थेट किल्ल्याच्या दरवाजातच घेऊन जाते.
आश्रमाकडून पुन्हा काही पावले मागे आलो आणि  डावीकडे वर जाणारी पायवाट पकडली. इथे किल्ल्याच्या पहिल्या प्रवेशद्वाराचे दर्शन झाले. येथील बुरुज ढासळले आहेत. अलीकडेपर्यंत दरवाज्याचा बराचसा भाग हा मातीखाली गडाला गेलेला होता. परंतु पुण्यातील शिव सह्याद्री संस्थेच्या कामातून हा दरवाजा पुन्हा आणला गेला आहे.
या दरवाज्याच्या आधी उजव्या बाजुला तटबंदीत हि कमान दिसते.
दरवाज्यातून पुढे चालत गेल्यावर माझा  प्रवेश किल्ल्याच्या माचीवर झाला. येथील बालेकिल्ल्याची तटबंदी आणि ताशीव कडे दृष्टीस पडतात.
माचीला सुद्धा तटबंदी आहे. ह्याची उंची अंदाजे वीस फूट आणि रुंदी पंधरा फुटाहून अधिक आहे. किल्ल्याची भौगोलिक रचना पाहता इतकी भव्य तटबंदी बांधायचा हेतू लक्षात येतो. किल्ल्याचा डोंगर चढायला अतिशय सोपा आहे. त्यामुळे शत्रू अगदी सहजपणे वर चढून येऊ शकतो. माचीवरील ही अभेद्य तटबंदी त्याला आत येण्यापासून रोखून ठेवू शकते.
माचीवरून पायवाटेने पुढे गेल्यावर आपल्याला अजून एक दरवाजा लागला. ह्या दरवाज्याची पडझड झाली आहे.
येथून आत गेल्यावर बालेकिल्ल्याचा दरवाजा मुख्य दरवाजा लागला.
हा दरवाजा गोमुखी बांधणीचा आहे. हा दरवाजा निश्चित्तच शिवकालात बांधला गेला असेल. दरवाज्याचा बराचसा भाग अनेक वर्षे जमिनीखाली गाडला गेला होता. शिव सह्याद्री संस्थे मार्फत मुरूम माती बाजूला करून दरवाजा बाहेर काढण्यात आला आहे. दरवाज्याचे चौकोनी दगड, ते एकमेकांवर चिकटवण्यासाठी वापरलेल्या चुन्याच्या रेषा स्पष्ट दिसतात.
दरवाज्यातून आत प्रवेश केल्यावर सुस्थितीत असलेल्या पहारेकर्यांच्या देवड्या दृष्टीस पडल्या.
बालेकिल्ल्यामध्ये प्रवेश केल्यावर डाव्या बाजूला मारुती आणि गणपतीचे भग्न अवस्थेतील मंदिर आहे.दरवाज्यातून आत शिरल्यावर समोरच हनूमानाचे टाके आहे. त्याच्याच मागे वाड्यांचे व घरांचे अवशेष आहेत.
त्याच्या पुढे प्रशस्त सदर आहे. ती पाहता राजगडाच्या सदरीची आठवण आल्यावाचून राहात नाही.
सदरीच्या मागच्या बाजूला तीन खोल्यांत विभागून बांधलेले धान्यकोठार आहे. त्याच्या भिंती शाबूत आहेत, परंतु छप्पर उडाले आहे. त्यात धान्य, दारुगोळा साठवित असत.
 गडमाथ्यावर हा चुन्याचा घाणा दिसला.
इथून मी निघालो ते गडावरचे मुख्य आकर्षण पहाण्यासाठी, "प्रचंड मोठी विहीर आणि तातोबा महादेवाचे मंदिर" पहाण्यासाठी. धान्यकोठाराच्या मागच्या बाजूस प्रचंड मोठं विहीर वजा टाकं आहे. टाक्यात खाली वाकून बघताना भीती वाटते. ह्या चौरसाकृती टाक्याची लांबी-रुंदी साधारण तीस फूट, तर खोली जवळपास पन्नास ते पंचावन्न फूट आहे. इतकं मोठं खोदीव टाकं यापुर्वी धुळ्याजवळचा सोनगिर आणि संकेश्वर जवळच्या वल्लभगडावर पाहिले होते.  टाक्यात पाणी नाही. माती आणि मुरूम ह्यामुळे ह्या टाक्याच्या बराच भाग बुजलेल्या अवस्थेत होता. शिव सह्याद्री संस्थेमार्फत मोठ्या प्रमाणावर गाळ काढण्यात आला, त्यामुळे टाक्यांची खोली आठ ते दहा फूट वाढली. टाक्याची मूळ खोली अजूनही जास्ती असण्याची शक्यता आहे.
एकुणच या परिसरातील पाण्याचे दुर्भिक्ष्य लक्षात घेउन इतकी खोल विहीर खोदलेली असावी. हि विहीर पाण्याने पुर्ण भरत असल्यावर गडावरच्या लोकांना काळजीचे कारण उरत नसणार. याच विहीरीचे पाणी नळाद्वारे ताथवडा गावात आणले जात होते. १९९३ पर्यंत त्याचा वापर होत होता , नंतर तो बंद झाला.

टाक्यात उतरण्यासाठी खोदीव पायऱ्या काढल्या आहेत.
 
खाली उतरताना वाटेत शंकराचे छोटे देऊळ आहे. यालाच "तातोबा महादेव" म्हणतात. याची एक कथा रहाळात सांगितली जाते. तातोबा नावाचा एक साधू या डोंगरावर राहत असे. त्याच्या ख्यातीमुळे रोजच भक्तांची गर्दी व्हायची. त्यामुळे त्याला साधनेला वेळ मिळत नसायचा. शेवटी कंटाळून त्याने या डोंगरावर एक विहीर बांधली आणि त्या विहिरीत तो राहू लागला. जेणेकरून लोकांना आपण कुठे आहोत याचा अंदाज येणार नाही. त्यामुळे त्याच्या दर्शनासाठी येणाऱ्या लोकांना साधूबाबा अचानक कुठे गेले हेच कळेना. एक दिवस या डोंगरावर आलेल्या एका गुराख्याला प्रचंड तहान लागली. पण त्याला पाणी कुठे आहे हे माहीत नव्हतं. अचानक त्याच्यासमोर हे तातोबा प्रकट झाले आणि आपल्या कमंडलूमधलं पाणी त्याला प्यायला दिलं आणि अचानक ते अंतर्धान पावले. चकित झालेल्या गुराख्याने आजूबाजूला शोध घेतल्यानंतर त्याला त्या विहिरीत एक शिवमंदिर आणि हे तातोबा दिसले. पुढे त्यांच्या भक्तांनी त्यांचं मंदिर गडावर बांधलं आणि त्यांचंच नाव पायथ्याच्या गावाला दिलं. तेव्हापासून या डोंगराला आणि त्याच्या पायथ्याच्या गावाला ‘ताथवडा’ असं म्हणू लागले. अर्थात ही एक दंतकथा असून याचा कोणताही पुरावा नाही. पण घटकाभर मनोरंजनाची गंमत मात्र यात आहे हे नक्की!!
 बालेकिल्ला त्रिकोणी आकाराचा असून तिन्ही टोकाशी बुरुज आहेत. पैकी दक्षिण बाजुचा बुरुजाला चिलखती तटबंदी आहे. ह्या बुरुजावरून खाली पाहिल्यावर ह्या बुरुजाची चिलखती तटबंदी दृष्टीस पडली.
इथे जाण्यासाठी बुरुजाच्या डाव्या आणि उजव्या बाजूने भुयारी मार्ग केलेले आहेत. दोन्ही बाजूला तटबंदी आणि मधून वाट. राजगडाच्या आळु दरवाज्याची आठवण आली. पूर्वीच्या लोकांनी काय हेतू डोळ्यासमोर ठेऊन इतकं भव्य बांधकाम केलंय हे कदाचित आपल्या कल्पनेच्या पलीकडे असू शकते.

चिलखती तटबंदी मधून एक चोरवाट डावीकडे उतरते. सध्या ही वाट काही प्रमाणात बुजलेल्या अवस्थेत आहे.
याच बाजुला एका प्रचंड प्रस्तरावर दुसरा प्रस्तर ठेवलेला पहायला मिळतो. असाच पाषाणस्तंभ चंदन किल्ल्यावरसुध्दा आहे. मात्र हि रचना कशासाठी याचा उलगडा होत नाही.
गडाच्या दक्षिणेला महादेव डोंगररांग पसरलेली दिसते. पुर्वेला लांबवर वारुगडाचा बालेकिल्ला दिसतो तर पश्चिमेला नांदगिरी उर्फ कल्याणगड त्याच्या माथ्यावरच्या वृक्षामुळे ओळखता येतो. यानंतर मी किल्ल्याच्या पूर्व दिशेकडे असणाऱ्या बुरुजावर आलो.
याच बाजुचे कातळ खडे आहेत आणि त्यावरचे होल्ड आणि एकुणच रचना विचारात घेता हे प्रस्तरारोहणाचा सराव करण्यासाठी आदर्श आहेत.  
येथून खाली पाहता भक्कम  तटबंदी दृष्टीस पडली. खाली जाण्यासाठी उभ्या असलेल्या बालेकिल्ल्याच्या बुरुजावरून दगडी जिना खाली काढला आहे. परंतु त्याची बरीच पडझड झालेली आहे. हा किल्ल्याच्या माचीचाच भाग असावा. माचीचा विस्तार फार नाही.
 ह्या तटबंदी मधून सुद्धा एक चोरवाट काढलेली दिसली. पण ती वाट तटबंदीच्या आत निघते याचे कारण समजले नाही. पण अशीच बरीच न उकल होणारी दुर्ग वैशिष्ट्ये या संतोषगडावर आहेत.
    किल्ल्यावरील विस्तीर्ण धान्यकोठार, बालेकिल्ल्यावरील सदर, बालेकिल्ल्याचे चिलखती बुरुज, त्यातील चोरवाटा, प्रचंड मोठं पाण्याचं टाकं, गोमुखी बांधणीचे दरवाजे लक्षात घेता हा किल्ला मोठ्या प्रमाणावर राबता असावा. याचा ईतिहास पहायला गेलो तर हा किल्ला शिवाजी महाराजांनी बांधला असल्याचे मानले जाते. पण ते सत्य नाही. फलटण हे आदिलशाहीतील संस्थान, त्यामुळे त्याच्या रक्षणासाठी ह्या मोक्याच्या जागी किल्ला उभारला असावा. किल्ला नेमका कोणी उभारला हे ज्ञात नसले तरी हा गड आदिलशहाकडे असल्याचे पुरावे आहेत. मोगल व आदिलशाही पत्रव्यवहारात ( २२ सप्टेंबर १६५७ च्या खुर्दखतमधे ) या गडाचा उल्लेख "तात्तोरा" तर मोडी पत्रव्यवहारात "ताथवडा, तानवटा, ताथोडे, ताथोडा" असा येतो. याचा अर्थ ती तातोबा महादेवाची दंतकथा थोडीफार खरी असावी. सन १६६५ मधे हा गड फलटणच्या बजाजी नाईक निंबाळकरांच्या ताब्यात होता. याच वर्षी शिवाजी महाराज व मिर्झाराजे जयसिंहाच्या पुरंदर तहानंतर मोगल-मराठे संयुक्त फौजांनी ७ डिसंबर १६६५ रोजी जिंकला. ताथवडा घेतल्याबध्दल औरंगजेबाने महाराजांना पोषाख व जडावाची कट्यार पाठवली. त्यानंतर आदिलशहाने तो तह करुन मोगलांकडून परत मिळवला. सन १६७३ मधे शिवाजी राजांनी तो जिंकून घेतला तसेच १६७५ व १६७६ मधे आजुबाजुचा प्रदेश जिंकून घेतला. महाराजांनी संतोषगडाची डागडुजी बहुधा याच काळात केली असावी. गडावरचे गोमुखी प्रवेशद्वार याच काळात बांधले असावे असा माझा अंदाज आहे. असे सांगतात कि हा किल्ला घेतल्यानंतर एकापाठोपाठ एक असे अनेक गड स्वराज्यात आले म्हणून महाराज संतोष पावले म्हणून या गडाचे नाव बदलून संतोषगड ठेवले.  मात्र १६७९ मधे आलमगिरी वावटळीत हा गड मोगलांनी जिंकून घेतला. पुढे १७२० मधे शाहुला नजराना म्हणून दिला. सन १७९० च्या महसुल अहवालावरुन हा गड नहिसदुर्ग सरकारमधे उपविभागाचे मुख्य ठाणे होता. सन १८१८ पर्यंत हा मराठ्यांच्या ताब्यात होता.  मात्र जनरल प्रिझलरने कमजोर असलेल्या दक्षीण व पश्चिमेकडून तोफांचा मारा करुन हा गड ताब्यात घेतला. पुढे १८२७ मधे ब्रिटीशांविरुध्द बंड करणारे स्वातंत्र्य सैनिक उमाजी नाईक यांनी या गडाचा आश्रय घेतल्याची नोंद सापडते.
    साधारण दोन तासात हि गडफेरी उरकून गावात उतरलो. इथून थेट फलटण गाठले. वाटेमधे वाठार निंबाळकर नावाचे गाव आहे, त्याठिकाणी एक छोटासा भुईकोट बघण्यासारखा आहे, पण मला हे माहिती नसल्याने त्यावेळी पहायचे राहून गेले. संबध प्रवासात पावसाचे अजिबात शिंपण झाले नाही तरी ताथवडा बघण्याचा "संतोष" मात्र मिळाला.

दुर्गसंवर्धनाविषयी : -
महाराजांच्या थोर विचारांचा अंश बनून जे किल्ले आज आपल्यामध्ये आहेत त्यांच्याकडे आजवर दुर्लक्ष करून एक प्रकारे आपण थेट महाराजांच्या विचारांचीच प्रतारणा करतोय, हाच विचार कुठेतरी खोलवर बोचला आणि ह्या विचारातून "शिवसह्याद्री दुर्गसंवर्धन -पुणे" ह्या संस्थेचा उगम झाला. बरोबर एक वर्षापूर्वी या आमच्या छोट्याश्या संस्थेची नोंदणी झाली व आम्ही पहिलाच झेंडा रोविला तो सातारा जिल्ह्यातील संतोषगडावर. संतोषगड म्हणजे माणदेशातील राजगडच जणू, त्याच माणदेशाचा राजगड उभा करण्याचा आमचा प्रयत्न चालू आहे.आज संस्थेच्या वर्धापन दिनानिमित संतोषगड संवर्धन मोहिमेच्या वर्षभराच्या कामाचा लेखाजोखा आम्ही मांडत आहोत.
कामापुर्वीचा संतोषगड:-स्थानिक ग्रामपंचायत व वन खात्याची लेखी परवानगी घेऊन आम्ही कामाचा श्रीगणेशा केला.ज्या वेळी आम्ही संतोषगडला पहिली भेट दिली त्या वेळेस गडाला फक्त तटबंदी शिल्लक दिसत होती.संपूर्ण गडावर घाणेरी ची झुडपे वाढली होती,गडाला असणारे तिन्ही दरवाज्यांपैकी दोन दरवाजे तर हातभरच शिल्लक दिसत होते तर तिसरा दरवाजा नुकताच उजेडात आला आहे.पहारेकर्यांच्या देवड्या सुद्धा दगड मातीने भरून गेल्या होत्या.बालेकिल्यावर असणारी तीनटप्पी राजसदर तर अप्रतिमच आहे ती  पूर्णपणे गाडून गेली होती.गडावर असलेली विहीर वजा पाण्याचे टाके व त्यामध्ये बांधलेले शिवमंदिर हे इतरत्र कुठेही पाहायला मिळत नाही ती विहीर पूर्ण दगड मातीने इतकी भरून गेली होती कि विहिरीच्या मधोमध उंबराची तीन झाडे उगवली होती जी विहिरीबाहेर डोकावत होती.गडाच्या दक्षिणेला असणारा चिलखती बुरुज व त्याला असणारे दोन दिंडी दरवाजे जे बुरुजाला छेदत आरपार झाले आहे.त्यातील एक दरवाजा सहा इंचच दिसत होता तर दुसरा पूर्णपणे गाडला गेला होता.

भुईंजकर जाधव – ऐतिहासिक घराणे

    सिंदखेडकर लुकजी (लखोजी) जाधव यांच्या घराण्याचे वंशज पुणे-सातारा महामार्गावर कृष्णाकाठी वसलेल्या भुईंज या गावी राहतात. लुकजीराजे निजामशहाकडे पाच हजारी मनसबदार होते. त्यांच्या कर्तबगारीच्या जोरावर पुढे त्यांना दहा हजारी मनसबदारी, अठ्ठावीस महाल व बावन्न चावड्यांचे वतन मिळाले. त्यामुळे त्यांना निजामशाहीत मोठे महत्त्व प्राप्त झाले. अकबराने निजामशाहीवर आक्रमणे केली (१५९४ ते १६००), त्यावेळी चाँदबीबीने त्यास यशस्वी तोंड दिले, ते जाधवरावांच्या सहकार्यामुळेच. चाँदबीबीचा खून झाल्यावर, निजामशाही अस्तंगत होत असताना, ती वाचवण्यासाठी, मुर्तजा नावाच्या वारसास परिंडा येथे तख्तावर बसवण्याचा जो प्रयत्न झाला, त्यात जाधवरावांचा हात होता. निजामशाही वाचवण्याचा प्रयत्न करणा-या जाधवरावांची पुढे मुला-नातवांसह निजामशहाकडूनच हत्या झाली! त्यानंतर जाधव कुटुंबातील काहीजण स्थलांतरित झाले. त्यांतील खंडोजीराव हे पुत्र भुईंज येथे वास्तव्यास आले. जाधवांचे ते घराणे भुईंज येथे नांदत आहे.
   जाधव घराण्‍याचे दोन वाडे भुईंज गावात होते. त्‍यापैकी एक वाडा पडला आहे. एक सुस्थितीतील चौसोपी आहे. त्‍या वाड्याचे दोन बुरुज दिसतात. वाड्यात जाण्यासाठी दोन बाजूंनी दहा-दहा रुंद पाय-या आहेत. वाड्याचा दरवाजा भक्कम स्थितीत आहे. आत शिरताच दोन प्रशस्त ‘ढेलजा’ दृष्टीस पडतात. जाधवरावांची कुटुंबे, वाटण्या झाल्यामुळे वेगवेगळ्या ठिकाणी राहतात. वाड्याचा दिवाणखाना उत्तम स्थितीत असून तेथे प्रशस्त देवघर आहे. देवघरातील मूर्ती सुंदर असून त्यातील गणपतीची मूर्ती विलोभनीय आहे. दिवाणखान्याच्या बाजूस असलेल्या प्रशस्त दालनात प्रभू रामचंद्रांच्या मूर्ती आहेत. ते दालन ‘राममंदिर’ असल्याचे मानले जाते. वाड्यात रामनवमीचा उत्सव साजरा केला जातो. पूर्वी, तो मोठ्या प्रमाणावर होत असे. कालपरत्वे त्याचे स्वरूप लहान होत चालले आहे. राममूर्तीसंबंधी आख्यायिका सांगितली जाते. ती अशी - एकदा एक घोडा गावात फिरत होता. त्या घोड्यास पकडून जाधवरावांच्या वाड्यावर आणले गेले. त्या घोड्याच्या गळ्यात वस्त्रात गुंडाळलेली प्रभू रामचंद्राची मूर्ती दिसून आली. त्या मूर्तीची प्रतिष्ठापना जाधवरावांनी त्यांच्या वाड्यात केली. जाधव घराण्‍याचे वारस त्यांच्याकडे ती मूर्ती ‘समर्थ रामदास स्वामींकडून आली’ असे सांगतात.
     जाधव घराण्यातील रायाजीराव नावाचे पुरुष २५ फेब्रुवारी १७२८ रोजी पालखेडच्या लढाईत धारातीर्थी पडले. त्यांची छत्री (समाधी/घुमट) भुईंज गावात उभी आहे. दगडकाम भक्कम आहे. त्या समाधीवरील शिल्पांमुळे तिला विशेष सौंदर्य प्राप्त झाले आहे. ती शिल्पे म्हणजे शिल्पकलेचा उत्कृष्ट नमुना आहेत. समाधीच्या जोत्यावर चारही बाजूंस सिंहाच्या तोंडात हत्ती असल्याचे शिल्प आहे. ते शिल्प यादवकालीन शिल्पकलेत पाहण्यास मिळते, त्यामुळे ते घराणे सिंदखेडकर जाधवराव या घराण्यातील आहे हे सिद्ध होते.
   त्यांच्याकडे महजराच्या नकलेशिवाय एकही कागद शिल्लक नाही. त्या महजरात जमिनीच्या वाटणीचा व्यवहार नमूद केला आहे. त्यावर अठरा लोकांच्या निशाण्या आहेत. त्यांत तीन शेट्टी यांच्या तराजूच्या, तर पंधरा पाटलांच्या नांगरांच्या निशाण्या आहेत. त्याशिवाय गुरव-मृदंग, कुंभार-चाक, चांभार-इंगो, माळी-खुरपे, मांग-चर्हाोट, न्हावी-आरसा, महार-विळा, दोरी, जंगम-घंटा, परीट-मोगरी, सोनार-सांडशी, तेली-घाणा, भोई-पालखी, तराळ-काठी, चौगुला-अधोली अशा निशाण्या आहेत.
त्या महजरात खंडो नारायण कुलकर्णी, बाबाजी बानाजी चौगुले, सुभानजी चौगुले यांची नावे आहेत. कसबे वाई, कसबे किकली, जांब, सुरुर, कवठे, केंजळ, कडेगाव, बावधन, ओझर्डे, गुळुंब, शेंदुरजणे इत्यादी ठिकाणच्या पाटलांच्या निशाण्या आहेत. महादजी गणेश, भागवत देशमुख, भगवंत सामराज, गिरजाजी सुंगो - देशकुलकर्णी, रामाजी अप्पाजी, जनार्दन - सुभेदार प्रांत वाई, राजाजी बाळाजी – सभासद प्रांत वाई हे प्रमुख अधिकारी असल्याचे त्या कागदपत्रांवरून समजते.
जाधवरावांच्या जहागिरीसंबंधीची आकडेवारी त्यांच्या घराण्यातील ब्रिटिश आमदानीतील एका कागदपत्रातून मिळते. त्यांना पंधरा लाखांपर्यंत जहागिरी होती.
 जाधवराव घराण्याने वंशाच्या कर्तबगारीचा वारसा स्वातंत्र्योत्तर काळातही भुईंज येथे चालवला. तात्यासाहेब जाधवराव हे त्यांपैकी एक कर्तृत्ववान पुरुष होते. त्यांनी काही सार्वजनिक कामे केली. कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या विनंतीवरून रयत शिक्षण संस्थेच्या कर्मवीर भाऊराव पाटील माध्यमिक विद्यालयाच्या इमारतीसाठी त्यांनी व त्यांचे बंधू नानासाहेब ऊर्फ माधवराव व बाळासाहेब यांनी पाच एकर जमीन दिली. तात्यासाहेबांचे पुत्र विजयसिंह ऊर्फ बाबासाहेब हे भुईंज गावचे काही काळ सरपंच होते व किसनवीर सहकारी साखर कारखान्याचे उपाध्यक्ष होते. त्यांच्या पत्नीदेखील काही काळ भुईंज गावच्या सरपंच होत्या. नानासाहेब जाधवराव हे अश्वारोहणात प्रवीण होते. त्यांचे साता-याच्या राजघराण्याशी निकटवर्ती संबंध होते. त्यांना शिकारीचा छंद होता. त्यांनी वाघ, रानडुकरे यांच्या शिकारी केलेल्या आहेत.   त्या घराण्याचे सोयरसंबंध सातारकर छत्रपती, दत्तवाडीकर, राजेघोरपडे, म्हसवडकर राजेमाने, माहूरकर, सासवडकर, जाधव, राजेशिर्के, खानविलकर, बडोदेकर, गायकवाड इत्यादी राजघराण्यांशी आहेत.
 जाधव वाडा- भुईंज
     सातारा जिल्ह्यातील वाई तालुक्यातील भुईंज गावात छत्रपती शिवाजीमहाराज व राणी सईबाई यांची मुलगी राणूबाई जाधव यांच्या वंशजांचा वाडा आहे.साधारण ३०० वर्षापूर्वीचा हा वाडा आहे.वाडा एकदम सुस्थितीत आहे. वाड्याचे भव्य प्रवेशद्वार आतमधला भव्य चौक लक्ष वेधून घेतो.आतमध्ये दिवाणखाना आहे. मोठे देवघर आहे.अनेक चित्रपटांचे चित्रिकरण पण ह्या वाड्यात झाले.बाड्याबाहेर एक शिवकालीन बारव आहे. जवळच राणूबाई यांची समाधी आहे. सद्यस्थितीत वाड्यात जाधवरावांचे वंशज भैय्यासाहेब जाधवराव हे राहतात.
  राणुआक्का या शिवाजी महाराज व सईबाई राणीसाहेब यांच्या द्वितीय कन्या. राणूबाईंचा जन्म इ.स.१६५१ मधे राजगडावर झाला. राणुआक्का म्हणजे प्रेम, त्याग ,समर्पण, ह्यांचा अखंडपणे वाहणारा झराच जणु..राणुआक्कांचे आपले छोटे बंधु शंभूराजे यांच्यावर अतिशय प्रेम होते. शंभूराजेंना आईची ऊणीव राणुआक्कानी कधीच भासु दिली नाही. आपल्या बंधुच्यामागे कायम त्या ढाली सारख्या ऊभ्या रहात.  राणीसाहेब सईबाई यांच्या मृत्यूनंतर इ.स.१६६० मधे जिजाऊ माँसाहेब व शिवाजी महाराज यांनी राणुबाई यांचा विवाह शिंदखेडचे लखुजी जाधवराव यांचे पुत्र दत्ताजी,दत्ताजी यांचे पुत्र ठाकुरजी व ठाकुरजी यांचे पुत्र अचलोजी जाधवराव यांच्याशी राजगडावर लावून दिला. जाधवरावांच्या घरी राणुबाईंचा विवाह करून जिजाऊ आऊसाहेबांनी आपले माहेर व शिवाजी महाराजांनी आपले आजोळ नव्या नात्याने जवळ केले.निजामशाहाने लखुजी जाधवरावांच्या मुला -नातवांडासह सर्वांची हत्या केली. त्यानंतर सर्व जाधवराव महाराष्ट्रात विखुरले गेले. यांची प्रमुख घरे भुईंज, माळेगाव, वाघोली , येथे स्थायिक झाली.
या प्रमुख घरापैकी भुईंज हे घर .येथेच राणुआक्का यांचे वास्तव्य होते.आजही भुईंज येथील वाडा इतिहासाच्या पाऊलखुणां जपत मोठ्या दिमाखात उभा आहे.राणुआक्का यांचे वंशज महेंद्रसिंह ऊर्फ भैय्या साहेब जाधवराव तेथे वास्तव्यास आहेत .

 अंभेरीचे कार्तिकेय मंदिर

 कार्तिकेय या देवतेबद्दल आपल्याकडे महाराष्ट्रात काहीशी नकारात्मक भावनाच दिसते. अर्थात त्याला कारणेही तशीच आहेत म्हणा. एक तर आपल्याकडे प्रचलित असलेल्या दंतकथा आणि कार्तिकेय या देवतेविषयी फारशी माहिती नसणे, अशी ती दोन कारणे दिसतात. स्त्रियांनी कार्तिकेयाचे दर्शन घेतले तर त्यांना वैधव्य येते ही भावना तर एवढी खोलवर रुजली आहे की, कार्तिकेय या नावाचा उच्चारसुद्धा टाळला जातो. त्याचबरोबर कार्तिकेयाला पार्वतीने दिलेला शाप आणि त्याबद्दलची अजून एक दंतकथासुद्धा जनमानसात रुजलेली दिसते. त्यामुळे फक्त कार्तिकी पौर्णिमा सोडली तर स्त्रिया कार्तिकेयाचे दर्शन अजिबात घेत नाहीत आणि एकूणच या देवतेविषयी उदासीनताच सर्वत्र जाणवते.   
 परंतु वस्तुस्थिती तशी नाही. कार्तिकेयाचे महत्त्व भारतभर जोपासलं गेलं आहे. त्याबद्दल अनेक महत्त्वाच्या कथा पुराणांमध्येही सापडतात. तो देवांचा सेनापती होता, योद्धा होता त्यामुळे विविध ग्रंथांमधून त्याच्याबद्दल आदरयुक्त उल्लेखही पुष्कळ मिळतात. मूर्तीशास्त्राच्या दृष्टीनेसुद्धा कार्तिकेयाच्या मूर्ती खूपच प्राचीन काळापासून आढळून येतात आणि त्यात वैविध्यसुद्धा आढळते. कार्तिकेय या देवतेचा उल्लेख अथवा आढळ हा अगदी कुषाण काळापासून म्हणजेच इ.स.च्या दुसऱ्या-तिसऱ्या शतकापासून सापडतो. कुषाण राजवटीमधल्या हुविष्क राजाच्या नाण्यांवर स्कंद, कुमार, विशाख असे वेगवेगळे देव आपल्याला पाहायला मिळतात. त्यांच्यानंतर येणाऱ्या यौधेयांच्या नाण्यांवरसुद्धा हातात कोंबडा घेतलेल्या ब्रह्मण्यदेवाचे अर्थात कार्तिकस्वामीचे दर्शन घडते. कार्तिकेय आणि अग्नी यांचा संबंध पाहून काहींनी थेट ऋग्वेदाशी त्याचा दुवा जोडण्याचा प्रयत्न केलेला दिसतो. उत्तर वैदिक काळात त्याचे स्कंद हे नाव पुढे आले आणि त्यानंतर सनत, विशाख, जयंत, वैजयंत, गुह, महासेन, धूर्त, लोहितगात्र अशी एक नाम शृंखलाच पाहायला मिळते. स्कंद हा धूर्त आणि चोर लोकांचाही देव समजला जातो. त्याचा एक संदर्भ मृच्छकटिक या नाटकात सापडतो. चारुदत्ताच्या घरी चोरी करणारा शर्वलिक हा प्रत्येक वेळी कार्तिकेयाचे स्मरण करून कामाला सुरुवात करतो असे उल्लेख आहेत.
कार्तिकेयाच्या व्यक्तिमत्त्वाप्रमाणेच त्याच्या जन्मासंबंधीसुद्धा अनेक कथा निगडित आहेत. तो शिव आणि पार्वतीचा पुत्र आहे असे मानले असले तरी तो पार्वतीचा अंगज पुत्र नसून, विभावसू अग्नीचा पुत्र होता. कार्तिकेय हा उमा, गंगा व कृत्तिकेचा पुत्रदेखील मानला गेला आहे. जन्मानंतर त्याच्यावर संस्कार करण्यास कोणी येईना म्हणून विश्वामित्राने त्यावर योग्य ते संस्कार केले होते अशा असंख्य कथा आहेत. एक गोष्ट मात्र खरी की कार्तिकेय ही शक्तीची देवता आहे. कदाचित काही टोळ्यांचे नेतृत्व त्याकडे होते. स्थानिक लोकदेवतांमधून या देवतेचा उगम झालेला दिसतो. भारतभर सर्वत्र सेनापती म्हणूनच ही देवता लोकप्रिय आहे. विविध राजसत्तांच्या नाण्यांवर असलेले कार्तिकेयाचे अंकन तसेच गांधार कलेतील त्याच्या उपलब्ध असलेल्या प्रतिमा हे त्या देवतेच्या लोकप्रियतेचेच गमक होय. कोंबडा हे चिन्ह काíतकेयाच्या बरोबर कायमच दिसते.
   उत्तर भारतात लोकप्रिय असलेला कार्तिकेय नंतर नंतर दक्षिण भारताकडे गेलेला दिसतो. आणि तिथे तो षण्मुगम, सुब्रह्मण्यम, आणि मुरुग्गन या नावांनी प्रचंड प्रसिद्ध पावला आहे. खरं तर आता उत्तरेकडे कार्तिकेयाची पूजा जवळपास बंद झालेली असताना दक्षिणेत मात्र त्याची लोकप्रियता अबाधित आहे. गावोगावी कार्तिकेयाची मंदिरे आहेत आणि उपासकही आहेत. इथले खास वैशिष्टय़ म्हणजे दक्षिणेत त्याला दोन पत्नी दिसतात. देवसेना आणि महावल्ली ही त्यांची नावे. खरं तर देवसेना ही त्याची पत्नी नसून त्याची शक्ती आहे. तारकासुर वधाच्या वेळी तो देवांच्या सेनेचा प्रमुख झाला होता, त्यामुळे देवसेना ही त्याची शक्ती होते तर महावल्ली ही त्याची पत्नी होय.
   या संपूर्ण उत्तरेकडून दक्षिणेकडील कार्तिकेयाच्या प्रवासात महाराष्ट्रात मात्र त्याचे अस्तित्व अगदी नगण्य जाणवते. वेरुळच्या लेणींमध्ये कार्तिकेयाची अत्यंत सुंदर मूर्ती आहे, पण इथे तो शिवपरिवारातील देवता म्हणून दिसतो. तसेच औंढय़ा नागनाथ मंदिरावर पण सुबक अशी कार्तिकेयाची प्रतिमा दिसते. पण उपास्यदेवता म्हणून वेगळे मंदिर अगदी अपवादानेच आढळते. (पुण्याला पर्वतीवरील मंदिर). कदाचित स्त्रियांना दर्शन निषिद्ध या दृढ झालेल्या कल्पनेमुळेसुद्धा असेल, पण काíतकेयाची उपासना महाराष्ट्रात फारशी आढळत नाही.
      या सर्व पाश्र्वभूमीवर सातारा जिल्ह्यतील वडुज तालुक्यातले अंभेरी गावचे कार्तिकेय मंदिर आणि तेथील प्रतिमा ही विशेषच म्हणायला हवी. रहिमतपूर-वडुज रस्त्यावर अंभेरी या गावी कार्तिकेय देवस्थान आहे. वडुजकडे जाताना एक छोटासा घाट लागतो. त्याचे नावसुद्धा कार्तिकेय घाट असेच आहे. घाटाखाली दरी आहे. त्या दरीत देवाचे वास्तव्य म्हणून त्या दरीला देवदरी असे सुंदर नाव आहे. वेशीतून आत गेले की अंदाजे एक कि.मी. वर रस्ता संपतो आणि समोरच जीर्णोद्धारित मंदिर दिसते. मंदिराच्या अलीकडे देवदरीवर एक लोखंडी पूल बांधला आहे. त्या पुलावरून पलीकडे वटवृक्षांच्या जवळच पाण्याचे कुंड आहे. जवळच काही समाधी दिसतात. तिथे हातपाय धुऊन मंदिराकडे जाता येते. पावसाळ्यात याच पुलावरून समोर कोसळणारा धबधबा फारच प्रेक्षणीय दिसतो. मंदिरात समोरासमोर दोन गर्भगृहे आहेत. जुन्या गर्भगृहाच्या पायऱ्या उतरून खाली गेले की आत एक शिविपडी दिसते आणि त्याच्या मागे मीटरभर उंचीची (अंदाजे चार फूट) काळ्या पाषाणातील काíतकेयाची अप्रतिम मूर्ती आहे. कार्तिकेयाला इथे एकच मुख असून त्रिभंग अवस्थेतील या मूर्तीला अंदाजे बारा हात आहेत. अंदाजे अशासाठी की वर्षांनुवष्रे तेल वाहिल्यामुळे त्या हातांवर एकप्रकारचे किटण तयार झालेले दिसते. आणि त्या थरात ते हात झाकून गेले आहेत. उजवा हात अभय मुद्रेत तर डावा हात कमरेवर ठेवलेला स्पष्ट दिसतो. देवाच्या उजव्या बाजूला खाली मोर असून त्याचा लांबसडक पिसारा डाव्या पायाच्याही पुढेपर्यंत आला आहे. दोन्ही हातांच्या खाली त्रिकोणी बोकडाच्या चेहेऱ्यासारखे अंकन आढळते. मूíततज्ज्ञ डॉ. देगलूरकर सरांच्या मते ते छगवक्त्र आणि नगमेष आहेत. कार्तिकेयाचा अग्नीशी असलेला संबंध इथे नगमेषाच्या रूपात दाखवला आहे. अग्नीनेच आपल्या मुलाला म्हणजेच कार्तिकेयाला खेळवण्यासाठी मेषाचे रूप घेतले होते अशी कथा पुराणात येते, त्याचाच हा पुरावा म्हणा किंवा त्यानुसार केलेले हे अंकन इथे दिसते. या सर्व बारकाव्यांवरून ही मूर्ती अंदाजे बारा-तेराव्या शतकातील असल्याचे तज्ज्ञ सांगतात. या कार्तिकेय प्रतिमेच्या गळ्यात एक घट्टसर दागिना व त्याखाली त्रिकोणी असणारा ग्रैवेयक हा दागिना दिसतो. पायापासून ते त्याच्या उजव्या खांद्यापर्यंत असलेला भाला (शक्ती) इथे फारच सुबकतेने अंकित केलेला आहे. डोक्यावर जटामुकुट असलेली ही डौलदार अशी प्रतिमा आवर्जून पाहण्यासारखी आहे. इतकी सुंदर प्रतिमा इथे कशी आली याबाबत मात्र काहीच माहिती मिळत नाही. स्थानिकांच्या मते वर्षांनुर्वष ही मूर्ती इथेच असल्याचे सांगितले जाते. याच मूर्तीशेजारी एक सहा तोंडांची अंदाजे पाऊण मीटर उंचीची अजून एक कार्तिकेयाची छोटी मूर्ती ठेवली आहे. ती मात्र बरीच अलीकडच्या काळातली वाटते. बारा हात असलेल्या या मूर्तीच्या हातात विविध आयुधं दिसतात; पकी उजव्या खालच्या हातातली गदा आणि डाव्या हातात धरलेले धनुष्य ही आयुधं प्रकर्षांने ठसठशीत आहेत. कमरेला धोतर नेसलेली ही प्रतिमा आहे. याच देवळातील दुसऱ्या गर्भगृहात अगदी नवीन संगमरवराची एकाच तोंडाची कार्तिकेयाची मूर्ती आहे. श्रावणातल्या पहिल्या सोमवारी आणि कार्तिकी पौर्णिमेला इथे मोठी यात्रा भरते. हा सबंध परिसर वटवृक्षांनी आणि झाडीने वेढलेला आहे. अर्थात महाराष्ट्रातील ठाम समजुतीनुसार इथे सुद्धा स्त्रियांना प्रवेश नाही. जिथपर्यंत गाडी जाते तिथून पुढे हा प्रवेशबंदीचा नियम आहे. परिसरात काही वीरगळसुद्धा ठेवलेले आढळतात.
इतक्या निर्मनुष्य ठिकाणाचे हे नितांतसुंदर देवस्थान मुद्दाम जाऊन पाहिले पाहिजे. सुप्रसिद्ध औंध संस्थानापासून अगदी जवळ असलेले हे ठिकाण आहे. कार्तिकेयाची उपासना महाराष्ट्रात जरी आढळत नसली तरी शक्तीचे प्रतीक असलेले हे दैवत भारतभर प्रसिद्ध होते आणि दक्षिणेकडे तर हे दैवत प्रचंड लोकप्रिय आहे. तारकासुराच्या वधासाठी देवांनी कुमार वयातच कार्तिकेयाला सेनापतीपद बहाल केलं आणि त्याने मग दैत्याचे निर्दालन केलं, असं सांगितलं जातं. सर्व सेनानीमध्ये तो अग्रणी आहे. गीतेमध्ये विभूती योगात भगवान म्हणतात की,
पुरोधसांच मुख्यं मां विद्धि पार्थ बृहस्पतिम
सेनानीनामहं स्कंद: सरसामस्मि सागर:
        म्हणजेच पुरोहितांमध्ये मी बृहस्पती, सेनापतींमध्ये स्कंद तर जलाशयांमध्ये मी समुद्र आहे. शक्ती, सेना, सामथ्र्य या सर्वाचं प्रतीक असलेला हा स्कंद, कार्तिकेय महाराष्ट्रात एका अनगड जागी वसला आहे. ते ठिकाण नितांत रमणीय आहे आणि त्याहीपेक्षा त्या कार्तिकेयाची मूर्ती फारच देखणी आहे. या ठिकाणी मुद्दाम भेट देण्यायोग्य हे स्थान अल्पपरिचित असले तरी तिथे जाऊन त्याचा परिचय करून घेतला पाहिजे, तसेच तिथल्या शांततेचा अनुभव आवर्जून घेतला पाहिजे.

साताऱ्याचे काळाराम मंदिर  :-

     सातारा; मीना शिंदे : सातारा शहरातील जुनी बाजारपेठ म्हणून प्रसिद्ध असलेल्या गुजर गल्लीतील म्हणजेच मंगळवार पेठेतील सुमारे ३५० वर्षापूर्वीचे काळाराम मंदिर भाविकांचे श्रद्धास्थान बनले आहे. गुजरातमधील नर्मदा डोहात सापडलेली काळ्या पाषाणातील मूर्ती असल्याने त्याला काळाराम मंदिर असे नाव पडले आहे. मुख्य गाभारा, सुबक व रेखीव मूर्ती, भक्कम सागवानी खांबांवर चौपाकी सभामंडप असे हे मंदिर अन् त्याचा इतिहास रामभक्तांमध्ये औत्सुक्याचा विषय ठरत आहे.
        १६७२ साली लीलाधर गंगाधर गुजर यांनी काळाराम मंदिराची स्थापना केली. मंदिर उभारणीमागे आख्यायिका आहे. रामदास स्वामी सन्जनगडावर वास्तव्यास असताना सातारा शहरात भिक्षा मागायला येत असत. भिक्षा मागून थकल्यावर गुजर गल्लील गायरानात विश्रांतीसाठी थांबत. तेव्हा लीलाधर गुजर त्यांची सेवा करत. त्यावेळी त्यांना प्रभू रामचंद्र यांचा दृष्टांत झाला. त्यावेळी प्रभू रामचंद्रांनी माझ्या मूर्ती नर्मदेच्या डोहात तुला सापडतील, असे सांगितले ही कथा लीलाधर गंगाधर यांनी श्री समर्थ रामदास स्वामी यांना सांगितली. समर्थ रामदास स्वामींनी लगेच त्यांना आदेश देऊन नर्मदेच्या डोहासाठी गुजरातमध्ये पाठवले चार पाच दिवसांच्या अथक प्रयत्नानंतर त्यांना नर्मदेच्या डोहात या काळ्या पाषाणाच्या मूर्ती सापडल्या.
        या मूर्ती सातारा शहरात आणल्या गेल्या. नंतर गुढीपाडव्याला त्या मूर्तीची स्थापना सातारा शहरात मिरवणूक काढून करण्यात आली. त्यावेळी रामदास स्वामींचा पदस्पर्श या मंदिराला झाला होता. वा मंदिर उभारणीत गुजराती समाजाचे योगदान जास्त असल्यामुळे गुजराती समाजाने काळाराम मंदिर हे नाव ठेवले. मुख्य राम मंदिराच्या शेजारी हटकेश्वर मंदिर तर समोर दास मारुतीचे मंदिर आहे.
          काळाराम मंदिरामध्ये रामनवमी उत्सव मोठ्या प्रमाणावर व श्रद्धापूर्वक केला जातो. रामनवमीला ९.३० वाजता मोठी आरती होते. या मंदिरामध्ये गंगाधर यांचे वंशज श्री रवींद्र पुरुषोत्तम शहा हे मंदिर व पूजा, उपासनेची सर्व व्यवस्था सांभाळत आले आहेत. या मंदिरामध्ये गोकुळाष्टमी, भागवत सप्ताह असे पारंपारिक उत्सवही साजरे केले जातात. या मंदिरातील मूर्तीची शृंगारिक पूजा केली जात असल्याने दररोज नक्षत्रानुसार पोशाख व आभूषणे घातली जातात. या मंदिरामध्ये राष्ट्रपती पारितोषिक विजेते वेदशास्त्र पारंगत श्रीकृष्णशास्त्री जोशी गेली ५५ वर्षे भागवत सप्ताह साजरा करतात व रामाची कथा सांगतात. या मंदिराची आणखी एक आख्यायिका आहे की, नवजात बाळाला रामाच्या पायावर ठेवल्यास त्या बाळाचा भाग्योदय होतो. त्रिशूल व रामाला लाभलेले नक्षत्रांचे देणे यामुळे त्या बाळाला तेज व आरोग्य लाभते.
          तसेच सातारा शहरात आणि आजूबाजूच्या परिसरामध्ये अशा भावना आहेत की, कुणाच्या घरात सर्प वगैरे निघाला तर काळाराम मंदिरात येऊन मंत्रजप केल्याने तो निघून जातो. तसेच घरात काळसर्प दोष असला तरी या काळाराम मंदिरातील मंत्राने दोष व नैराश्य निघून जाते, अशी नागरिकांची श्रद्धा आहे. काळाराम मंदिराची व्यवस्था सध्या लीलाधर गुजर यांच्या चौदाव्या पिढीतील मोहन पुरुषोत्तम शाहा (गुजर) हे पाहत आहेत.
         या मंदिरामध्ये पारंपरिक असा रामनवमीचा उत्सव होतो. या उत्सवाचे वैशिष्ट्य म्हणजे ९ दिवस आरती चालते. त्यामध्ये महाआरती, कापूर आरतीचे विशेष माहात्म्य आहे. आपल्या घरातील दुःख, संकट किंवा पीडा कापराद्वारे यज्ञात टाकायच्या व आपले गाऱ्हाणे रामापुढे मांडून निघून जायचे. कालांतराने श्रीरामांच्या आशीर्वादाने सर्व पीडा, संकटांचे निवारण होत असल्याचीही आख्यायिका असल्यामुळे कापूर आरतीचे महत्व कायम आहे.

वाठार निंबाळकर

सातारा जिल्ह्यातील फलटण तालुक्यातील एकाच गावातील १० भव्य वाडे असलेले गावं म्हणजे "वाठार निंबाळकर". इतिहास, जूने वाडे व त्याची वास्तूरचना यामधे ज्यांना रस आहे त्यांनी एकदा तरी या गावाला भेट द्यायलाच हवी. महाराष्ट्रांतील राजघराण्यांत फलटणचे निंबाळकर घराणे फार जुनें असून सुमारे साडेसातशें वर्षापासुन हे घराणे महाराष्ट्रात आहे. वाठार गाव छत्रपती शिवरायांच्या काळापासून अस्तित्वात असुन छत्रपती शाहूराजे यांनी या गावची निमपाटीलकी भोईटे घराण्याला दिली होती. आदर्की खुर्द हे निंबाळकर घराण्याची पाटीलकी असणारे गाव होते.सन १७७१ नंतर कुशाजी निंबाळकर यांच्या काळात ही बांधकामे झाली आहेत. कुशाजी निंबाळकर यांचा काळ थोरले माधवराव पेशव्यांच्या समकक्ष आहे.  ही बाब लक्षात घेता हे वाडे २०० वर्षापुर्वीचे आहेत. फलटणच्या निंबाळकर घराण्याचा मूळ पुरुष निंबराज  यांचा सन १२२१ साली मृत्यू झाला पुढे त्याच घराण्यातील मालोजीचा सन  १५७० च्या दरम्यान मृत्यू झाल्यानंतर त्यांचे म्हाकोजी व अर्जोजी या दोन पुत्रांपैकी म्हाकोजी व त्यानंतरचे त्यांचे वंशज  हे वाठार गावचे इनामी वतन, शेर्‍या, देशमुखी यांचा उपभोग घेत राहिले. या काळात फलटणच्या घराण्याशी संघर्ष सुरु होता व त्याचा परिणाम म्हणून कुशाजीला गाव सोडून जावे लागले होते पण थोरल्या माधवराव पेशव्यांनी अभय दिल्यावर कुशाजी यांनी स्वत:ची व वाठारची प्रगती केली. चांगला व इतका द्रव्यसंचय केला की, पेशव्यांना व इतर मराठा सरदारांना कर्ज देऊ लागले. याच कुशाजींनी मूळ वाठार गावालगत ओढ्याच्या इशान्येस नवीन वाठार २७ एकरास पूर्ण तटबंदी करुन वसवले व त्यात १ मुख्य व त्यालगत ९ भव्य वाडे बांधले.
     येथे छत्रपती शाहू यांच्या काळात १७०७-४९ च्या दरम्यान संताजी निंबाळकर यांचा उल्लेख येतो. येथे मुधोजीराव नाईक-निंबाळकर यांचा वाडा होता. इतिहासाचार्य राजवाडे यांच्या मराठ्यांच्या इतिहासाची साधने यामध्ये वाठारजवळ असलेल्या सालपे घाटात निंबाळकर-जाधव यांच्यात लढाई झाल्याची नोंद आहे. धनाजी जाधवांच्या मृत्यूनंतर १७११च्या सुरवातीस चंद्रसेन जाधव हे शाहूचा पक्ष सोडुन कोल्हापुरास जात असता छत्रपती शाहू यांच्या आज्ञेवरून हैबतराव निंबाळकर हे चंद्रसेन जाधव यांच्यावर चालून गेले. हि लढाई मार्च-एप्रिल दरम्यान आदर्कीच्या घाटाखाली झाली.
      फलटणचा इतिहास व ऐतिहासिक वास्तु म्हणजे निंबाळकर याचा प्रत्यय आपल्याला फलटण फिरताना जागोजाग दिसुन येतो. सातारा जिल्ह्यातील फलटण तालुक्यात वाठार निंबाळकर येथील राजे नाईक निंबाळकर यांची किल्लेवजा गढी महाराष्ट्रात असलेल्या इतर सर्व गढीपेक्षा खूपच वेगळी आहे. येथे केवळ एक स्वतंत्र गढी नसुन तटाबुरुजांनी सजलेल्या सहा स्वतंत्र गढ्या व दोन मंदिरे असुन हि सर्व ठिकाणे एका मुख्य तटबंदीच्या आत साधारणपणे २७ एकर परीसरात सामावली आहेत.
बांधकाम सौंदर्याने सजलेल्या या वास्तु आज दुर्दशेच्या फेऱ्यात सापडुन नष्ट होत आहे. यात केवळ एक गढी याला अपवाद आहे. मराठेशाहीच्या उत्तरकाळात पेशव्यांच्या वर्चस्वाखाली असलेल्या अनेक वतनदारांनी त्यांच्या प्रदेशात भुईकोट व गढ्या बांधल्या. यातील बरेच भुईकोट वाडे हे खाजगी स्वरूपाचे असुन त्यांचा उपयोग महसूल जमा करण्यासाठी व स्वसंरक्षणसाठी होत होता. वतने खालसा झाल्याने खाजगी मालमत्ता असलेल्या या गढीकोटाची देखभाल करणे गढी मालकाला अवघड झाल्याने बहुतांशी गढी कोट उध्वस्त होत चालले आहेत. स्थानिकांची या वास्तुबाबत असलेली उदासीनता देखील या गढीकोटांच्या ऱ्हासाला कारणीभूत होत आहे. आंतरजाल व इतर कोणत्याही पुस्तकात या गढीची माहिती सापडत नसल्याने या किल्लेवजा गढीची ओळख करून देण्याचा हा छोटासा प्रयत्न.
     वाठार निंबाळकर हे ठिकाण पुण्यापासुन सासवड-जेजुरी-निरा-लोणंदमार्गे १०४ कि.मी. अंतरावर असुन साताऱ्यापासून ६० कि.मी. अंतरावर आहे तर फलटणपासुन हे अंतर केवळ ९ कि.मी. आहे. वाठार व वाठार निंबाळकर हि दोन्ही ठिकाणे वेगवेगळी असुन यात ३२ कि.मी अंतर असल्याने स्थान निश्चित करताना वाठार निंबाळकर असा स्पष्ट उल्लेख करावा.
   वाठार गावात नदीकाठी हि गढी असुन या संपुर्ण गढीचा परीसर जवळपास २५ एकर आहे. गढीच्या पश्चिम भागात असलेल्या नदीवर बंधारा घालुन नदीचे पाणी अडविल्याने पश्चिमेकडून गढीला नैसर्गीक खंदक लाभला आहे. यामुळे गढीची अर्ध्यापेक्षा जास्त तटबंदी सुरक्षित झाली आहे.
 गढीच्या उत्तरेस गढीचा मुख्य दरवाजा असुन दक्षिणेस दुसरा दरवाजा आहे. सध्या या तटबंदीतुन पश्चिमेला नव्याने वाट काढली आहे.
गढीचे तटबंदी बुरुजाचे बांधकाम व भव्य दरवाजा आजही या वास्तुच्या भव्यतेची साक्ष देतात.
 गढीचा दगडी बांधणीतील उत्तराभिमुख कमानीदार दरवाजा २०-२२ फुट उंच असुन याच्या लाकडी दारावर अणकुचीदार खिळे ठोकले आहेत.
  गढीची बुरुज व तटबंदी घडीव दगडात बांधलेली असुन त्यामध्ये बंदुकीच्या मारगीरीसाठी जंग्या ठेवलेल्या आहेत.
मुख्य दरवाजातून आत प्रवेश केल्यावर समोरच या कोटाच्या मध्यभागी असलेली मुख्य गढी दिसुन येते. या गढीचा दरवाजा समोरून दिसू नये यासाठी आडवी भिंत घातलेली आहे. कोटात अशा एकुण सहा गढ्या व एक मंदिर असुन मुख्य गढीचा परीसर दिड एकरचा तर उर्वरित गढ्यांचा परीसर प्रत्येकी एक एकरचा आहे तर मंदिर परीसर अर्धा एकर आहे. या सर्व वास्तुना वेगळी तटबंदी असुन प्रत्येकी स्वतंत्र पाणी व्यवस्था आहे.
दरवाजातून आत शिरल्यावर सर्वप्रथम उजवीकडील तटबंदीत असलेले राममंदिर पाहुन घ्यावे. हे मंदिर म्हणजे मध्ययुगीन मंदिर स्थापत्याचा उत्तम नमुना आहे.
चारही बाजूस प्राकार म्हणजे तट असलेल्या या मंदिराचे गर्भगृह व सभामंडप असे दोन भाग असुन गर्भगृह दगडाचे तर सभामंडप लाकडी बांधणीतील आहे.
मंदिराच्या आतील भागात दोन शिलालेख असुन सभामंडपातील लाकडावरील कोरीवकाम व चित्रकला अतिशय सुंदर आहे पण ते आज कोसळण्याच्या स्थितीत आहे.
मंदिराच्या आवारात एक कमान व पायऱ्या असलेली मोठी विहीर असुन त्यातील पाणी मोटेने काढुन पाटाने मंदिराच्या आवारात फिरवलेले आहे.
मंदिराच्या तटाला असणारे कोनाडे व वासे रोवण्याच्या खाचा पहाता येथे मोठया प्रमाणात राहण्याची सोय असावी.
मंदीरासमोर दोन घुमटी असुन यातील एका घुमटीत हनुमानाची मुर्ती आहे.
याशिवाय मंदिराच्या दक्षिण बाजुस एक लहान दरवाजा व दुहेरी पोकळ तटबंदी असुन त्याचे नेमके प्रयोजन ध्यानात येत नाही.
मंदिर पाहुन झाल्यावर मुख्य गढीत जाण्यापूर्वी डावीकडील वाडा पाहुन घ्यावा. या वाडयाच्या आतील बाजूस असलेल्या दरवाजावरील दुमजली वास्तु आजही चांगल्या स्थितीत असुन दुसरा दरवाजा बाहेरील तटबंदीत आहे.
या वाडयाच्या संपुर्ण तटबंदीत कोनाडे असुन त्यासमोर जोते दिसुन येते. वाड्याच्या मध्यभागी एक आयताकृती लहान विहीर असुन इतर अवशेष पुर्णपणे नष्ट झाले आहेत. वाड्याचे उध्वस्त बांधकाम पहाता हा वाडा दुमजली असावा.
हा वाडा पाहुन झाल्यावर समोरील मुख्य गढीकडे निघावे. कोटात असलेल्या ६ गढीपैकी हि गढी आकाराने सर्वात मोठी असुन इतर गढीच्या मानाने आजही सुस्थितीत आहे. चौकोनी आकाराच्या या गढीत चार टोकाला चार तटबंदीच्या मध्यभागी प्रत्येकी एक व दरवाजा शेजारी दोन असे एकुण ९ बुरुज असुन हि गढी नऊ बुरुजांचा वाडा म्हणुन ओळखली जाते.
  गढीचा उत्तर दरवाजा साधारण १५ फुट उंच असुन त्यातील लाकडी दार आजही शिल्लक आहे. या दरवाजाला लहान दिंडी दरवाजा असुन दरवाजाच्या वरील बाजूस नगारखान्याची इमारत आहे. गढीची तटबंदी व बुरुज घडीव दगडात बांधलेले असुन त्यात बंदुकीच्या मारगीरीसाठी जंग्या ठेवलेल्या आहेत.
 दरवाजाच्या आतील बाजूस पहारेकऱ्याच्या देवड्या असुन आतील बाजुने वाडयाच्या वरील भागात जाण्यासाठी दोन बाजुना जिने आहेत.
 गढीतील वाडा पुंर्णपणे कोसळलेला असुन केवळ दरवाजा शेजारील अवशेष शिल्लक आहेत. हे अवशेष पहाता मूळ वाडा चार मजली असल्याचे दिसुन येते. गढीच्या आत मोठया प्रमाणात काटेरी जंगल वाढले असल्याने त्यातुन मार्ग काढत आत फिरावे लागते. गढीची बुरुज तटबंदी आजही पुर्णपणे शिल्लक असुन तटावरून फेरी मारता येते.
गढीच्या पुर्व बाजूस म्हणजे उजवीकडे असलेल्या तटबंदीत तटावर जाण्यासाठी पायऱ्या असुन या पायऱ्या जवळील बुरुजावर एक पिराचे ठाणे आहे. येथे ध्वज फडकवण्याची जागा दिसुन येते.
याशिवाय गढीच्या आत कमान व पायऱ्या असलेली एक चौकोनी विहीर असुन पश्चिमेकडील तटबंदीत संकटकाळी बाहेर जाण्यासाठी गुप्त दरवाजा आहे.
 दोन बुरुजांच्या खाली व वरील भागात खोल्या असुन गढीच्या आत मोठया प्रमाणात घराची जोती दिसुन येतात. हि गढी पाहुन मुख्य दरवाजाने बाहेर आल्यावर या गढीच्या मागे असलेल्या उजवीकडील तिसऱ्या गढीकडे निघायचे.
 या गढीची रचना मुख्य गढीसारखीच असुन सात बुरुज असलेल्या या गढीत काही प्रमाणात वाड्याचे अवशेष दिसुन येतात पण आत मोठया प्रमाणात काटेरी झाडी वाढली असल्याने आत फिरता येत नाही.
 दरवाजाच्या आतील दोन्ही बाजूस असलेल्या बंदिस्त जिन्याने तटावर गेले असता संपुर्ण गढी व बाहेरच्या कोटाचा तसेच आसपासचा परीसर नजरेस पडतो.
या गढीतील अवशेष पहाता हा वाडा तीन मजली असावा. हि गढी पाहुन बाहेर आल्यावर सरळ जाऊन येथील घरामधून डावीकडे वळावे.
या वाटेच्या टोकाला कोटाचा दुसरा दक्षिण दरवाजा आहे. या भागात नदीच्या बाजुने असलेली कोटाची बाहेरील तटबंदी व बुरुज पहायला मिळतात.
 येथे तटाबाहेर एक मोठी दगडी बांधणीची विहीर असुन या विहिरीचे वैशिष्ट म्हणजे या विहिरीत उतरण्यासाठी कोटाच्या आतील बाजुने पायऱ्या असुन कोटाबाहेरून देखील या विहिरीचे पाणी काढता येते.
  हे पाहुन झाल्यावर परत जाताना वाटेत उजवीकडे आपल्याला चौथ्या गढीचे उध्वस्त अवशेष जागोजाग दिसुन येतात.
या गढीचे चारही बुरुज व दरवाजा शिल्लक असुन आतील बाजूस असलेली तटबंदी पुर्णपणे ढासळली आहे व त्यावर नव्याने घरे झाली आहेत.
या वाटेवर आपल्याला एक समाधी व विठ्ठल रुक्मिणीचे मंदिर पाह्यला मिळते.
येथुन पुढे आल्यावर आपल्याला उजवीकडे पाचवी गढी पहायला मिळते. हि गढी आजही तिच्या मूळ स्वरुपात जतन केलेली असुन एक निंबाळकर परीवार तेथे वास्तव्यास आहे. गढीत राहत असल्याने आत मर्यादित प्रवेश दिला जातो. या गढीच्या आवारात दोन लहान मंदिरे असुन त्यावरील कळस मात्र चुन्यात बांधले आहेत.  या वाड्याचे जितेंद्र निंबाळकर व त्यांच्या मुलांनी मूळ पाया व रचना कायम ठेवून अतिशय सुंदर नुतनीकरण केलेय! तेही पाहण्यासाठी सकाळी काही वेळासाठी संध्याकाळी ४ ते ६ या वेळेत त्यांनी उपलब्ध केलेय. तेही ज्यांना वास्तू रचनेत रस आहे त्यांनी पहायला हवी अशी बाब आहे. जितेंद्र निंबाळकर यांनी स्वत: या कामाची तसेच मुख्या वाड्याच्या चाललेल्या कामांची माहिती दिली.
या गढीच्या पुढील बाजूस सहावी गढी असुन या गढीच्या दरवाजावर दगड रचुन आत प्रवेश करण्यास मनाई करण्यात आली आहे. येथे आपली कोटाची प्रदक्षिणा पूर्ण होते.
संपुर्ण कोट व सहा गढी पहाण्यास तीन तासापेक्षा जास्त कालावधी लागतो पण गढी या प्रकारात वेगळे काही पाहिल्याचे समाधान मनाला मिळुन जाते.
एकंदरीत दुर्गप्रेमींबरोबर ज्यांना पुरातन वास्तुशास्त्रात रस आहे त्यांनी किंवा मराठेशाही कालातील बांधकाम शैलीच्या अभ्यासकांनी आवर्जून भेट द्यावे असे हे ठिकाण आहे.गड्,किल्ले म्हणले कि बहुतेकांना डोंगरी गड बघण्यात रस असतो.तरीही हे असे भुईकोट आपल्याला एका वेगळ्या विश्वात घेउन जातात.वेळ काढून अश्या ठिकाणी भेट द्यावी आणि इतिहासात हरवून जावे.

वाठार - इतिहासातील एक महत्त्वाचं घराणं नाईक-निंबाळकरांचं. या घराण्याच्या कारकीर्दीत, यांचा मूळ पुरुष निंबराज यानेच फलटण गाव वसविले. वेगवेगळ्या काळामध्ये, फलटणची वेगवेगळी नावं आपल्याला पाहायला मिळतात. या घराण्यामधे अनेक वीर पुरुष होऊन गेले. त्यांनी राहण्यासाठी फलटणच्या जवळ काही वाडे बांधले. त्यांपैकी एक वाडा आहे फलटणपासून सात कि.मी. अंतरावर वाठार गावी. या गावाला 'निंबाळकरांचे वाठार' या नावाने ओळखतात.
इतिहासामध्ये, इ.स. १५६० ते १५७० या दरम्यान या भागामध्ये मालोजी निंबाळकरांची सत्ता होती. त्यांना म्हाकोजी आणि अजोंजी ही दोन मुलं. मालोजीच्या मृत्यूनंतर म्हाकोजीस वाठार गाव इनाम देण्यात आले. हाच, या निंबाळकर वाठार घराण्याचा मूळ पुरुष. याचे अनेक वंशज या गावात होऊन गेले. यातील कुशाजी
निंबाळकरांच्या वडिलांवर फलटणकर निंबाळकरांनी जुलूम करण्यास सुरुवात केली. त्रासाला कंटाळून, चाठारचे निंबाळकर शेवटी गाव सोडून निघून गेले. पण थोरले माधवराव पेशवे यांनी इ.स. १७७१ मध्ये कुशाजींना अभयपत्र दिले आणि त्यांना बोलवून घेतले. हा कुशाजी, सरदार-मानकऱ्यांना कर्ज देत असे. अशा या कुशाजीने वाठारमध्ये बांधलेले बाडे पाहण्यासारखे आहेत. कुशाजींचा वाडा या नावाने ओळखली जाणारी ही वास्तू मोठी तर आहेच, शिवाय या वाडयाच्या भोवती, याच्यापेक्षा आकाराने थोडेसे लहान, असे आठ बाडे आहेत. याचे बांधकाम इ.स. १७९६ ते १८०५ च्या दरम्यान चालू होते. कुशाजींना एकूण आठ मुले. त्यांच्यासाठी, त्यांनी हे वाडे बांधल्याचं सांगितलं जातं. या वाडयाची बांधणी मुख्यतः बुरूज, मोठे, भक्कम आणि तेवढेच सुंदर आहेत. या बाडांपैकी दोन वाडे अपूर्ण राहिले. बाकीचे, मुख्य वाडा आणि त्याच्याच बाजूला बांधलेले वाडे आजमितीला ढासळलेल्या अवस्थेत आहेत. तरीही त्यांच्या भिंती, चौथरा यावरून त्यांची भव्यता लक्षात येते.
        इथली मुख्य वास्तू म्हणजे कुशाजींचा वाडा. या वाड्याचा दरवाजा आजतरी पूर्णपणे शिल्लक आहे. त्यातून आत आल्यावरच वाड्याची रचना आणि बांधणी समजते. याच्या शिल्लक असलेल्या बांधकामावरून हा वाडा तीनमजली असावा; कारण - वाड्याच्या दरवाज्याला लागून तीनमजली, पायऱ्यांची एक वास्तू जेमतेम उभी आहे. याच्या उजव्या बाजूस एक बांधीव विहीर आहे. वाड्यामध्ये सध्या बाभळीचे रान माजलेले आहे. त्यामुळे फिरताना काळजी घेणे आवश्यक आहे. वाट काढत, विहिरीच्या बाजूने, तटबंदीवर जाण्यासाठी पायऱ्या आहेत. तटबंदीवर गेल्यावर, मागच्या बाजूस बुरुजावर एक कबर आहे. तटबंदीवर फिरताना, दोन ठिकाणी बुरुजामध्ये, खाली जाण्यासाठी पायऱ्या आहेतः शिवाय कोपऱ्यावरील बुरुजांवर तोफा डागण्यासाठी बांधलेले गोल चौथरे आहेत. जवळपास सर्व ठिकाणी तटाचा वरचा भाग तटबंदीपासून सुटू लागलेला आहे.
वाड्याच्या बाहेरील बाजूस, तटबंदीवर लावलेल्या रंगामुळे वाडा जास्त आकर्षक वाटतो. या वाड्याच्या एका बाजूला राममंदिर आहे. मंदिरालाही लहान तटबंदी केलेली आहे. किंबहुना ते वाड्याच्या लगत असलेल्या तटबंदीमध्ये आहे. काहीशा विस्तीर्ण आवारामध्ये मध्यभागी रामाचे मंदिर आहे. मंदिराच्या उजव्या बाजूला एक विहीर आहे. ही विहीर आकाराने लहान असली तरी दातेगड आणि कमळगडावरील विहिरीसारखी, पण दगडामध्ये बांधलेली आहे. मंदिराला मंडप
आणि गाभारा असे दोन भाग आहेत. मंदिराचा गाभारा हेमाडपंती शैलीतील दगडाचा तर मंडप लाकडाचा बांधलेला आहे. मंडपाच्या बाहेरच्या बाजूला मातीचा गिलावा केलेला आहे. त्यावर काही देवतांची चित्रे रेखाटलेली आहेत. स्थानिक लोकांच्या सांगण्यानुसार इथे, वाड्यामध्येही काही भिंतीवरची चित्रे होती. ती आता डेक्कन कॉलेज पुणे येथे ठेवलेली आहेत.
कुशाजींच्या वाड्याच्या मागच्या बाजूला दुसरा एक वाडा चांगल्या अवस्थेत आहे. या वाड्याला बारा बुरूज असून दोन बुरुजांमधील तटबंदीची काही ठिकाणी पडझड झालेली आहे. हा वाडा फिरताना आपण एखाद्या अप्रतिम वास्तूमध्ये आहोत हे जाणवतं. वास्तू विषयावर अभ्यास करणाऱ्यांसाठी वाठार गावातील हे वाडे परिपूर्ण आहेत. वाड्याच्याजवळ म्हाकोजीच्या वंशातील दोन जणांच्या समाध्या आहेत. मंदिररूपातील या वास्तू देखील अवश्य पाहण्यासारख्या आहेत.
या घराण्यातील काही वंशज आजही या गावात राहतात.

मांढरदेवी : -
    लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेले मांढरदेव हे तिर्थक्षेत्र सह्याद्रीच्या पर्वतरांगेत वाई व भोरपासून सुमारे चोवीस किलोमीटर अंतरावर आहे. ते सातार्‍यातून २० कि.मी. अंतरावर आहे. पुण्यापासून सुमारे २०० कि. मी. अंतरावरचे हे ठिकाण आहे. वाई कडून किंवा भोर कडून या तीर्थक्षेत्राकडे जातांना घाट चढून जावे लागते. काळूबाईचे हे ठिकाण समुद्रसपाटीपासून सुमारे ४६५० फूट उंचीवर आहे. मांढरदेवी येथील देवी माता पार्वतीचे रूप असुन काळेश्वरी या नावाने ओळखली जाते.
       मांढरगडावरील आई काळूबाईचा नवरात्रोत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. मांढरगडावरील काळूबाई देवीचा महिमा अलौकिक आहे.अरुंद वाटा असलेली चढण चढत जाऊन देवीचे दर्शन घ्यावे लागते.शाकंभरी पौष पौर्णिमेला दरवर्षी हजारो भक्त येथे दर्शनाला येतात. मांगिरबाबांच्या देवळाशी नारळ फोडून, काळूबाईचे दर्शन घेणे आणि दीपमाळेत तेल घालणे अशा परंपरेसह भाविक दर्शन घेतात . देवीला पौराणिक पोळी आणि दही भात दिले जाते. साधारण तीन लाख भाविक इथे उपस्थित असतात.
     देवीचे मंदिर कधी व कोणी बांधले याची फारशी नोंद आढळून येत नाही. पण मंदिराच्या हेमाडपंथी शैलीतील बांधकामामुळे हे मंदिर बरेच प्राचीन असल्याचे सिद्ध होते. सह्याद्री पर्वतरांगेतील एका उंच अशा टेकडी वर मांढरदेवी काळुबाई चे मंदिर आहे . .मंदिराचा अंतर्गाभारा, गाभारा व सभामंडप असे तीन भाग आहेत. सभामंडपाचे बांधकाम अठराव्या शतकात झाले.  कळस रेखीव असुन त्यावर गाय, सिंह यांच्या मुर्ति बसविलेल्या आहेत. मंदीर पुर्वाभिमुख असुन मंदिरासमोर दिपमाळा आहेत.मुख्य दरवाजाशी दगडी कासव आहे. सभामंडपात मध्यभागी देवीचे वाहन सिंह असून, तो संगमरवरी दगडात आहे. देवीची पालखी चांदीची असून विशेष प्रसंगी व मिरवणुकीच्या वेळी देवीची छबिन्यासह मिरवणूक निघते. नवसाला पावणारी व भक्तांचे कल्याण करणारी देवी म्हणून काळूबाई देवीची ख्याती आहे. मुख्य मंदिराभोवती गोंजीबुवा, मांगीरबाबा, अशी देवी सेवक व राखणदार यांची मंदिरे आहेत. परिसर निसर्गरम्य असुन वनराई ने नटलेला आहेअनेकांचे कुलदैवत असणाऱ्या काळूबाईचा मांढरदेव गड महाबळेवर इतक्‍याच उंचीवर वसला आहे. या ठिकाणी हवामान नेहमी थंड असते.
      मांढरदेवी येथे देवीचे स्वयंभू स्थान (मुर्ती) असुन मुर्ती चत्रुभुज आहे. देवीच्या उजव्या हातात त्रिशूल आणि तलवार आहे.तर डाव्या हातात ढाल आणि दैत्याची मान पकडलेली आहे.देवी उभी असुन एक पाय दैत्याच्या छातीवर ठेवलेला आहे. संपुर्ण मुर्तीस शेंदुर लावलेला आहे. देवीला बारामाही साडी नेसवलेली असते व चेहर्यावर चांदीचा तर यात्रोत्सवात सोन्याचा मुखवटा बसविला जातो. देवीचे वाहन सिंह आहे.
काळेश्‍वरीची महती
काळेश्वरीची मूळ तीन रूपे आहेत. यामध्ये पहिले उग्ररूपी तामस (कोलकत्ता), दुसरे सत्त्वरूप (गुजरात येथील पावागड), तर तिसरे राजसरूप हे मांढरदेव येथे पहायला मिळते. घटस्थापना, ललिता पंचमी, अष्टमी, नवमी व दसऱ्याला देवीच्या दर्शनासाठी यात्रेला महाराष्ट्रासह, कर्नाटक, आंध्रप्रदेशमधून भाविक येतात. मंगळवार, शुक्रवार, रविवार, अमावस्या, पौर्णिमेला दर्शनासाठी नेहमीच गर्दी असते. या देवीचे मूळ नाव काळूबाई (काळेश्वरी) असून ती काळूआई, मांढरदेवी या नावाने ओळखली जाते. काळेश्वरी याचा अर्थ जी काळाची ईश्वर आहे ती किंवा काळाला नियंत्रित करणारी शक्ती ती काळेश्वरी. शैव व शाक्त पंथीयांमध्ये या स्थानाला विशेष महत्त्व आहे. नवसाला पावणारी, कार्य सिद्धीस नेणारी, भक्तांवरील संकटात त्वरेने धावून येणारी अशी काळूबाईची ख्याती आहे.
    देवीची अनेक रूपे आहेत. आदिशक्ती, आदिमाता, तुळजाभवानी, कलेची शारदा, संपत्तीची लक्ष्मी, दुर्जनांचा संहार करणारी आदिशक्ती आदिमाता मांढरदेवची काळूआई, काळेश्वरी, काळूबाई, मांढरदेवी म्हणतात. ही देवी म्हणजे पार्वतीचे साक्षात कालिमातेचे रूप असे सांगितले जाते. 
    आख्यायिका – सतयुगात मांढव्य ऋषि गडावर यज्ञ करित होते. (या ऋषिंमुळे गडाला मांढरगड नाव पडले) त्यांचा यज्ञकार्यात लाख्यासुर नावाचा दैत्य त्रास देत होता. तेव्हा दैत्याचा त्रास कमी व्हावा आणि यज्ञकार्य सिध्दिस जावे म्हणून मांढव्य ऋषिंनी महादेवांना प्रसन्न करून घेण्यासाठी तपश्चर्या करण्यास सुरवात केली. तेव्हा महादेव प्रसन्न होवुन पार्वतीची प्रार्थना करण्यास सांगितले. पार्वतीची प्रार्थना करण्यास सुरवात केली. तेव्हा पार्वतीने प्रसन्न होवुन दैत्यवधासाठी अवतार घेईल असे सांगितले. आणि दैत्यवधासाठी देवी कैलासातुन या मांढरगडावर आली. लाख्यासुराला महादेवाचा वर असल्याने दिवसा त्याचा वध करणे शक्य नव्हते. तेव्हा देवीने रात्री चा वध करण्याचे ठरविले. पौष पोर्णिमेच्या रात्री देवीने दैत्याला युध्दासाठी आवाहन केले आणि तुंबळ युध्द करून मध्यरात्री लाख्यासुराचा वध केला व पुन्हा दैत्य निर्माण होऊ नये म्हणून लाख्यासुराचे सर्व रक्त प्राशन केले. युद्धकार्य उरकून देवी परत कैलासास निघाली आणि मांढरगड डोंगर चढुन वर आली आणि ऋषिंमुनी व भक्तजनांकरिता इथेच स्थानापन्न झाली.
     मांढव्यऋषींच्या नावावरून देवीला मांढरदेवी आणि गावाला मांढरदेव असे नाव पडले. आणखी एक आख्यायिका अशी- पौष पौर्णिमेच्या मध्यरात्री काळेश्वरीने देविलाख्यासुर राक्षसाचे शिर उडविले. ते शिर देवीच्या चरणावर पडले. देवीलाख्याच्या रक्तावर सूर्यकिरण पडले तर अनेक राक्षसांसह जिवंत होण्याचा वर त्याला होता. देवीलाख्यासुर पुन्हा जिवंत होऊन काळेश्वरीशी युद्ध करण्याची शक्‍यता सटवाईने काळेश्वरीस सांगितली. सूर्योदयूार्वी विशालकाय देह धारण करून काळेश्वरीने त्याचे सर्व रक्त नष्ट केले. हे सर्व जाणून देवी लाख्यासुर काळेश्वरीला शरण गेला. काळेश्वरीच्या चरणाजवळ आश्रय देण्याची विनंती केली. त्यावर देवीने त्याला चरणाजवळ आश्रय दिला.
     याशिवाय अजून एक अख्यायिका सांगितली जाते ती अशी,  देवासुर संग्रामानंतर जे काही राक्षस उरले त्यांना देवीने युद्धामध्ये पराजित केले. पण महिषासूर व रक्तबीज हे राक्षस मात्र काही केल्या पराजित होत नव्हे. कारण त्यांना अभय होते. त्यांचे निर्दालन करावे म्हणून सर्व देव पार्वतीकडे गेले. देवी व तिचे सर्व सैन्य शिवगण, दाक्षायणी, चंडिका युद्धास सज्ज झाली व घनघोर युद्ध झाले.
  अनेक राक्षस मारले गेले. शेवटी महिषासुर शरण आला. त्याला देवीने आपल्या पायाजवळ स्थान दिले. देवीला महिषासुरमर्दिनी म्हणून ओळखले जाते. रक्तबीजाला मारण्यासाठी तिने अष्टायुधे धारण केली. आक्राळविक्राळ रूप धारण करून त्याला ठार मारले. त्यानंतर देवीला शांत करण्यासाठी स्वत: शंकर देवीच्या मार्गात झोपले. गर्जना करत देवी फिरत असताना तिचा पाय शंकराला लागला आणि तिचे तेजपुंज शरीर काळवंडले, म्हणून तिला काळूबाई, कालिका असे म्हणतात. त्यानंतर देवी श्रमपरिहारासाठी मांदार पर्वतावर म्हणजेच मांढरदेव डोंगरावर गेली.
  एका आख्यायिकेनुसार मांढरदेव येथील पाटील घराण्यातील भाविकाला दृष्टान्त झाला म्हणून गावकऱ्यांनी त्या ठिकाणी जाऊन जमीन खोदली. त्यांना जमिनीत देवीची मूर्ती आढळली. तिथेच त्यांनी तिची प्रतिष्ठापना करून मंदिर बांधले. दुसरी आख्यायिका आहे की येथील महादेवाच्या मंदिरात मांढव्यऋषी तपश्‍चर्या करीत होते. ते शिवभक्त होते. त्यांना दैत्य नावाचा राक्षस त्रास देत होता. शंकराने महाकालीद्वारे या दैत्याचा नाश केला. त्याच्या सन्मानार्थ मांढव्यऋषी व गावकऱ्यांनी डोंगराच्या शिखरावर तिचे मंदिर बांधले.
    देवीने पौष पोर्णिमेच्या रात्री दैत्याचा वध केला आणि विजयी झाली. म्हणून आजही पौष पोर्णिमे ला देवीची मोठी यात्रा भरते. या काळात लाखो भाविक देवीचे देव्हारे घेउन गडावर येतात. भाविक गडावर चुली पेटवून देवीला पुरणपोळीचा नैवेद्य दाखवतात. पौष पोर्णिमेच्या मध्यरात्री देवीचा मुखवटा पालखीत बसवुन हजारो वाद्यानच्या गजरात देवीचा छबिना काढला जातो. देवीचा छबिना हा यात्रोस्तवाचे मुख्य आकर्षण आहे.




पाटेश्वर मंदिर व लेणी ( देगाव -सातारा) :-

 पुणे-कोल्हापूर महामार्गावरील सातारा हे असंच एक टुमदार शहर. शहराचा पसारा काही फार नाही, परंतु त्याला इतिहास खूपच मोठा. अजिंक्यतारा किल्ल्याच्या मांडीवर पहुडलेल्या या सातारा शहराच्या जवळच एका डोंगरावर असलेलं भन्नाट आणि वैशिष्टय़पूर्ण असं ठिकाण म्हणजे पाटेश्वर. सरत्या पावसाळ्यात अगदी वेगळ्या ठिकाणी जायचं असेल तर पाटेश्वरला पर्याय नाही. सातारा शहरापासून १४ किमीवर देगाव हे गाव आहे. या गावाच्या मागे असलेल्या डोंगरावर पाटेश्वराचे अप्रतिम मंदिर व लेणी आहेत.पाटेश्वर डोंगर माथ्यावर एकूण तीन लेणी समूह व एक मंदिर समूहाशिवाय अन्य देखील मंदिरे आहेत. सातारा ते सातारा एम.आय.डी.सी  ७ किमी व सातारा एम.आय.डी.सी ते देगाव ७ किमी अंतर आहे. देगावला जाण्यासाठी सातार्‍याहून सिटी बस व रिक्षाची सोय आहे. देगाव बस स्थानकाच्या मागील डोंगरावर जाण्यासाठी एक कच्चा रस्ता आहे. या रस्त्याने पावसाळा सोडून इतर ऋतुत जीप सारखे वहान जाऊ शकते. या रस्त्याने आपण पाऊण तासात चालत पाटेश्वरला पोहोचतो. 
येथे पोहोचण्यासाठी राष्ट्रीय महामार्ग ४ वरील सातारा शहराच्या पुढे कोल्हापूरला जाताना बोरगाव हे ठिकाण असून येथे येता येते तर राज्य महामार्ग क्रमांक ७३ वरील चिचणेंर वंदन वरून दुसरा निगडी व तिसरा राजेवाडी या गावाहून मार्ग आहे.
    देवांचे देव म्हणून श्री महादेव या देवांचे महत्त्व अनादि काळापासून हिंदू धर्माच्या लोकांच्या हृदयात आहे. शिव-शंभूचे निवासस्थान एकतर गिरिदुर्गावर किंवा स्मशानात असते असा लौकिक सामान्यजनात कायमचा ठसलेला आहे. तेहतीस कोटी देव ही संकल्पना हिंदूंच्या हृदयी ठाम असल्याने अनेक देवांनी दिलेल्या वरामुळे पृथ्वीवर कधीकधी अत्याचार होत होते. अशावेळी इतर देव भगवान शिवांस अत्याचार करणाऱ्या दानवी प्रवृत्तीचा बंदोबस्त करण्याची विनंती करीत. मग शिव अवतार घेऊन त्या दुष्टाचे समूळ निर्लमून करीत. अशाप्रकारे पृथ्वीवरील अत्याचारी शक्तीचा " शिव-युक्ती "ने नाश होऊन समाज भयमुक्त होत असे.
   महादेव नेहमीच गिरिशिखरांवर तपसाधना करीत असतात असा प्राचीन ग्रंथातून उल्लेख आढळून येतो. कैलास पर्वतावर महादेवाचे जास्तीतजास्त वास्तव्य असल्यामुळे शिवकैलास असाच उल्लेख आपणास नेहमीच पुराण ग्रंथात दिसून येतो. भारतातील प्रमुख शिवमंदिरे ही बहुधा घनदाट वृक्षराईंनी आच्छादित गिरिस्थळी असल्याचे दिसून येते. त्या शिवाय जी शिवालये नागरी वस्तीत असतात ती प्रामुख्याने नदी, ओढा यांच्या तीरावर निर्माण केलेली आहेत. जलसंस्कृतीच्या काठावर मानवी वसाहती हे तर आपले वैशिष्ट्य आहे. भारतातील बारा ज्योतिर्लिंगापैकी पाच एकट्या महाराष्ट्र राज्यात आहेत. शिवभक्ती व आराधना मराठी माणसाच्या रक्तात आहे. ब-याच शिवमंदिरांच्या निर्मितीचा कालखंड हा ज्ञात नसल्यामुळे, सामान्यतः ती पांडवांनी अज्ञातवासात असताना एका रात्रीत बांधली आहेत असा सर्वसामान्य लोकांचा समज असतो पण त्यात कोणतेही तथ्य नसते.
पाटेश्वरचे वैशिष्ट्य म्हणजे लेण्यांमध्ये, मंदिरामध्ये विविध आकारात, प्रकारात, कोरलेल्या अगणित "शिवपिंडी". येथे बोटाच्या पेरा एवढ्या लहान आकारापासून ते अंदाजे ४ फूट उंचीच्या पिंडी पाहायला मिळतात. अशीच विविधता पिंडींच्या कोरीव कामातही आढळते.     
    सातारा शहराच्या जवळ असूनही येथे लोकांची फारशी वर्दळ नसते. त्यामुळे या डोंगरवरील निसर्ग अजूनही शाबूत आहे. त्यामुळे येथे अनेक पक्षीही पाहायला मिळतात. त्यामुळे सातार्‍याला जाणार्‍या प्रत्येक निसर्गप्रेमीने अजिंक्यतारा, कासचे पठार, बामणोली याबरोबर पाटेश्वरलाही आवर्जून भेट द्यावी.
   सातारा-रहिमतपूर रस्त्यावर देगाव इथे पाटेश्वरचा फाटा आहे. गाडीरस्ता पुढे जाऊन एका डोंगरावर चढतो आणि काही अंतर गेल्यावर हा रस्ता संपतो. 
    देगांवपासून सुमारे दिड ते दोन कि. मी. अंतरावर असलेल्या खिंडीतील वाहनतळापर्यंत दुचाकी किंवा चारचाकी वाहन सहजपणे जाते. तेथून पुढे सुरू होते आपले पदभ्रमण म्हणजेच पायी चालणे. अरुंद पण सपाट पाऊलवाट, दोन्ही बाजूला विपुल निसर्ग संपदा. थोडेफार अंतर चालून गेल्यावर आपल्याला दगडी पाय-या असल्याचे दिसून येते. 
सुरवातीच्या काही दगडी पायऱ्या चढल्यावर उजव्या बाजूला विसावलेली अतिशय प्रेक्षणीय अशी श्री गणेशाची पुरातन मूर्ती दिसताच नकळत आपण गणेश दर्शनासाठी दोन्ही हात जोडून नतमस्तक होतो. शेंदूर लावल्याने मूर्तीचे पुरातन सौंदर्य व अस्तित्व दोन्हीही लुप्त होत आहे अशी भावना मनात साहजिकच तयार होते. ब-याच ठिकाणच्या मंदिरात असलेल्या देवदेवतांच्या मूर्ती ह्या लेपांच्या आवरणाखाली असल्याने त्यांचे सौदंर्य व प्राचीनत्व लोप पावलेले आहे, अशीच काहीशी परिस्थिती येथील मूर्तीच्या बाबतीत देखील आहे. गणेशाच्या दोन्ही बाजूला स्त्री वेषातील शेंदूर आच्छादित दोन मूर्ती रिध्दी-सिद्धी असाव्यात.
 त्यानंतर काही पायऱ्या चढून गेल्यावर पुन्हा अरुंद पाऊलवाट सुरू होते. चालताना दोन्ही बाजूच्या वनश्रीने नटलेल्या द-या पाहताना निसर्गाच्या किमयेला मनोमन वंदन केले जाते. आजूबाजूच्या झाडावर विविध प्रकारचे पक्षी, वनचर अगदी खारूताई मुक्तपणे झाडांच्या फांद्यावरून  फिरताना पाहून मनाला आनंद होतो. तिथून पुढे आपण डोंगर सपाटीवर येतो. तिथून अंदाजे ४५ मिनिटे चालत जायचे. दोन्ही बाजूंनी सभोवतालचा परिसर अप्रतिम दिसतो. शिवाय अधून मधून दरीतून येणारा भन्नाट वारा झेलत हे चालणे फारच आनंदाचे जाते. चालताना आपण एकटे नसतो. असंख्य गोड आवाजात गाणारे पक्षी आपल्याला साथ देत असतात.
     दहा पंधरा मिनिटांची पायपीट केल्यावर समोर सदगुरू गोविंद महाराजांचा मठ दिसतो. 
डाव्या बाजूला भलीमोठी डोंगरदरी तर उजव्या बाजूला भव्य दगडी बांधकामातील चौकोनी पुष्करणी पाण्याने तुडुंब भरलेली दिसून येते. या पुष्करणीचे नाव " विश्वेश्वर पुष्करणी " असून आयताकृती अशी ही पुष्करणी सुमारे ६० चौरस मीटर क्षेत्रपळ असलेली आहे. हिच्या उत्तर दिशेला एक गोमुख आहे तर पूर्वेकडील भागात एक पाय असलेली "अज एकपाद " मूर्ती सुबक कोरलेली आहे, परंतु ते शिल्प कोणत्या देवाचे आहे याची माहिती मिळत नाही.हि  शिवाची दुर्मिळ "अजएकपाद"मूर्ती मानली जाते, या शिल्पातील मुर्तीला एकच पाय कोरलेला आहे.या पुष्करणीच्या शेजारीच एक पूर्वाभिमुख असलेली साध्या प्रकारची लेणी आहे. हिच्या आतमधे बांधीव भिंतीवर आयताकृती शाळूंकेवर पाच गोलाकार शिवलिंगे असून त्यांची पन्हळी उत्तर दिशेला आहेत. येथे अन्य विविध प्रकारची शिवलिंगे आहेत.
वर चढत जाणार्‍या पायर्‍या , वाटेत दिवे ठेवण्यासाठी बाजूच्या भिंतीमध्ये खोदलेल्या खाचा आणि मधे मधे भिंतीच्या आतल्या बाजूच्या मूळच्या कातळात कोरलेल्या शिवपिंडी अशी या मार्गाची रचना.
विश्वेश्वर तळे व मठाच्या दरम्यानच्या जागेतून फरसबंदी पायऱ्यांच्या वाटेने वर चढून गेल्यावर श्री पाटेश्वराचे पूर्वाभिमुख दगडी बांधकामातील अतिशय प्रेक्षणीय मंदिर दृष्टीपथात येते. दगडी पायऱ्या चढून जाताना दोन्ही बाजूला देवकोष्ठे असून त्यात अनेकविध शिवलिंगे ठेवलेली आहेत. 
सभोवतालच्या तटबंदीतून मंदिर परिसरात जाण्यासाठी ' कार्तिकस्वामी' नावाचे लहान प्रवेशद्वार पूर्वेकडील बाजूला असले तरी त्याचा फारसा वापर होत नसावा हे जाणवते. उत्तरेकडील बाजूच्या मुख्य दरवाजाने मंदिर परिसरात सर्व भक्त प्रवेश करतात. या प्रवेशद्वाराच्या उजव्या बाजूस कोपऱ्यात अंदाजे चार फूट उंचीचे विशाल शिवलिंग सहजच दिसून येते, तर त्याचे पाठीमागे भग्न झालेली हनुमान मूर्ती आहे. दुसऱ्या बाजूच्या ओवरीत शेंदूर लेपन केलेली आणखी एक वीर हनुमान मूर्ती आढळून येते. मंदिर परिसरात प्रवेश केल्यावर चोहोबाजूची दगडी तटबंदी व आतील संपूर्ण भागात दगडी फरसबंदी आहे. आतमधे मुख्य मंदिराबरोबरच आणखी लहान तीन मंदिरे आहे.  देवळाच्या एका बाजूला अष्ट भुजा व दुसर्या बाजूला भैरव आहे.
     नंदीमंडप, सभामंडप आणि गर्भगृह अशी या मंदिराची रचना. आजूबाजूला काही छोटी छोटी मंदिरे असून त्यात वेगवेगळ्या मूर्ती कोरलेल्या आहेत. 
मुख्य मंदिराच्या समोरील भागात स्थापत्यकलेचा अप्रतिम नमुना असलेल्या दोन भव्य दीपमाळा आहेत. श्री पाटेश्वर मंदिर व दीपमाळा यांच्या दरम्यान घडीव दगडी चारखांबी मंडपात नंदीची भव्य व तकाकी असलेल्या आभुषणे परिधान केलेली मूर्ती आहे. 
नंदीमूर्तीच्या पुढील पाय व गळ्यातील घंटे दरम्यान शिवलिंगावर चवरी ढाळणा-या दोन दासींच्या सुबक मूर्ती कोरलेल्या आहेत. नंदीचे दर्शन घेण्यासाठी तीन ते चार पायऱ्या चढून जावे लागते. त्या समोरच सुमारे मीटरभर उंचीच्या जोत्यावर मुख्य मंदिराचा सभामंडप नक्षीदार दगडी खांबावर उभारलेला आहे. 
 नंदीमंडप
सभामंडपात विविध देवदेवतांच्या देखण्या मूर्ती असल्याचे दिसून येते, यात डाव्या कोनाड्यात शेषशायी, उजव्या बाजूस स्त्रिलिंगी गणपति तर दक्षिणाभिमुख कोनाड्यात बनशंकरीची मूर्ती आहे. त्यानंतर अंतराल मधे जमिनीवर कासव असून त्याच्या सभोवती मत्स्य, मानवी शिल्प व इतर काही शिल्पे असल्याचे जाणवते.  मंदिराच्या सभामंडपात महिषासूरमर्दिनी, विष्णू, स्कंद, आणि स्त्रीरूपी गणेश म्हणजेच गणेशिनी किंवा विनायकी अशा मूर्ती कोरलेल्या दिसतात. तर गर्भगृहात पाटेश्वराचे मुख्य शिवलिंग आहे. जणू काही हे एक शिवपंचायतनच.
  महिषासुरमर्दिनी आणि विनायकी
     शंकराची लिंग आणि मूर्ती अशा दोन्ही स्वरूपातील मूर्ती ह्या मंदिरात दिसतात. पाटेश्वराचे मुख्य शिवलिंग हे लिंगरूपात तर बाजूच्याच एका लहान मंदिरात शंकर मूर्तरूपात कोरलेला आहे. 
चतुर्मुख शिव
हे मूर्तस्वरूप पण साधेसुधे नाही तर चतुर्मुखी आहे. एकाच धडावर एकाच रेषेत चार शिरे कोरलेली आहे. ही मूर्ती ब्रह्मदेवाची म्हणून अगदी सहजच फसगत होते पण नीट निरखून बघायला एका हातात त्रिशुळ तर दुसर्‍या हातात कमंडलू आणि दंडावर सर्पमुखी बाजूबंद तर डोक्यावर अर्धचंद्र कोरलेला दिसतो. अजूनच काळजीपूर्वक बघता प्रत्येक शिराच्या कपाळावर कोरलेला तिसरा डोळाच दिसायला लागतो आणि हा शंकरच याची अगदी खात्रीच पटते. आहे की नाही गंमत.
गर्भगृह हे सभामंडपाच्या तुलनेत थोडेसे खोलगट भागात असून श्री. पाटेश्वराच्या पिंडीवर सतत जलाभिषेक होत असतो. पाटेश्वराच्या शिवलिंगाच्या मागील भिंतीतील देवकोष्ठात चतुर्भुज सरस्वतीची रेखीव मूर्ती स्थापित केलेली आहे. पाटेश्वराच्या मनोभावे दर्शनाने दैनंदिन जीवनात यशस्वी होण्याची आत्मिक शक्ती मिळते. या मंदिराच्या निर्मितीचा निश्चित असा कालखंड ज्ञात नाही, मात्र हे मंदिर साधारणतः इसवी सनाच्या दहाव्या शतकातील असावे. तर अठराव्या शतकात सावकार परशुराम नारायण अनगड यांनी जीर्णोद्धार केल्याचे बोलले जाते आणि याची शाश्वती देखील वाटते. कारण सातारा शहराच्या सोमवार पेठ येथे पूर्वी ह्या सावकार परशुराम अनगड यांचा वाडा होता. त्यांनी माहुली येथील रामेश्वर देवालय व एक घाट बांधला होता तसेच महाबळेश्वर येथील कृष्णामाई मंदिराचा देखील जीर्णोद्धार केल्याची नोंद इतिहासात आढळून येते. महाराष्ट्रात अनेक राजघराण्यांनी देवस्थान विकासाला महत्त्व देऊन विशेष सहकार्य केले आहे परंतु मंदिर, बारव, नदीवरील घाट याच्या निर्मिती व जीर्णोद्धारासाठी पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांचे महत्त्वपूर्ण योगदान असल्याचे इतिहासाने पाहिले आहे. या कारणास्तव देखील पाटेश्वर मंदिर जीर्णोद्धारात अहिल्याबाईंचे सहकार्य नक्कीच झाले असावे असा मनात नैसर्गिकरित्या विचार येतो. पाटेश्वर मंदिराचे शिखर नागरशैलीचे असून त्यात कोनाडे आहेत. भाजक्या विटांचे चुन्याच्या मिश्रणात हे बांधकाम केलेले आहे. मंदिर मंडपावर चौहोकोप-यावर लहान स्तंभ असून मध्यभागी एक लहान शिखर आहे. याच मंदिराच्या डावीकडे अष्टादशभुजामहालक्ष्मीचे म्हणजे महिषासुरमर्दिनीचे मंदिर आहे, व त्याचे शेजारी ब्रम्हदेवाचे छोटेखानी सुरेख मंदिर आहे. पाटेश्वर मंदिरसमूहाच्या दक्षिणेस डोंगरमाथ्यावर कार्तिकेयाचे लहान मंदिर असून येथे मूर्तीसमोर देखील एक शिवलिंग आहे.   
   पाटेश्वरचे मंदिर हे मंदिर स्थापत्यशास्त्राचा उत्कृष्ट नमुना आहे. या मंदिरातील दगडात कोरलेला नंदी व ४ फूटी उंच शिवलिंग यांची प्रमाणबध्दता व यावरील तकाकी पहाण्यासारखी आहे. पाटेश्वर बघण्यातील खरी मजा मात्र हे मंदिर बघण्यात नाही तर ती आहे इथला अद्भूत लेणीसमूह बघण्यात, इथली तर्‍हेतर्‍हेची शिवलिंगे बघण्यात, इथल्या गूढरम्य वातावरणात हरवून जाण्यात
याची सुरवात होते ती मठाजवळच पायर्‍यापांशी असलेल्या एकमुखी शिवलिंगाने. पुष्करणी जवळूनच पहिल्या लेण्याकडे जाण्याचा मार्ग आहे, या लेण्याला मरगळ म्हशीचे लेणे म्हणतात.या लेण्यात मृतावस्थेत पडलेल्या म्हशीच्या पाठीवर शिवलिंग दाखवलेले आहे. याचा संदर्भ महिषासूर मर्दनाच्या पुराणातील कथेशी असावा. या बरोबरच लेण्यात एकूण ६ शिवलिंग ओळीने कोरलेली आहेत. 
   एकाच वेळी सयोनी, अयोनी आणि मूर्तरूपात असलेली अशी शिवलिंगे विरळाच. सयोनी शिवलिंग म्हणजे आपण नेहमी शाळूंकेसहित जे शिवलिंग पाहतो ते तर अयोनी म्हणजे खालची शाळूंका नसून फक्त वरचा लिंगस्वरूपाचा भाग असलेली पिंडी. चौकोनी शाळूंका तिच्यात कोरलेले मुख्य दाढी मिशा असलेले एकमुखी शिवलिंग आणि बाजूने कोरलेली अयोनी पद्धतीची ५७ शिवलिंगे अशी याची रचना. तर याच्या बाजूलाच एका शिवपिंडीच्या शाळूंकेत एक मुख्य सयोनीज शिवलिंगे आणि त्याच्या बाजूने सरळ उभ्या रेषेत कोरलेली असंख्य लहान लहान सयोनीज शिवलिंगेच कोरलेली आहेत तर अजून थोडे पुढे जाताच एक आयताकार शिवलिंग दृष्टीस पडते शिवलिंग व त्यापुढच्या तीन शिल्पपटात ५ अयोनीज पद्धतीची लिंगे, मध्ये कलश तर त्याच्या बाजूला एका परत एका वर्तुळात कोरलेली पाच अयोनीज शिवलिंगे. जणू पंचमहाभूतांचे हे प्रतिकच. 
  एकमुखी लिंग
 सयोनीज शिवलिंगे
 पंचमहाभूतांचे प्रतिक असलेले शिवलिंग
 श्री. पाटेश्वराचे दर्शन घेऊन परत पुष्करणी जवळ आल्यावर समोरील बाजूच्या पायवाटेने पुढे गेल्यावर दुसरा प्राचीन लेणीसमूह पाहण्यास मिळतो.  पाटेश्वरची हिंदू (ब्राम्हणी) लेणी कधी आणि कोणी खोदली हे अज्ञात आहे.सुरूवातीसच खडकात खोदून तयार केलेली लहानसे बांधीव पाण्याने भरलेले टाके दिसून येते. यातील पाणी पिण्यासाठी वापरत असावेत. त्याच्या शेजारीच चार लेणीगृह असून त्यापैकी उत्तराभिमुख तीन व पश्चिमाभिमुख लेणी आहेत. येथील प्रत्येक लेण्यात विविध आकाराच्या अनेक शिवलिंग आहेत. या लेण्यास " नंदिकेश्वर लेणी " म्हणून संबोधतात. 
 आता मठाच्या बाजूने खालच्या बाजूने जाता जाता मुख्य लेणीसमूहाचा परिसर लागतो. ह्या लेण्या अत्यंत प्राचीन. ह्यांच्या काळाचा मागोवा घेतला असता त्या कमीतकमी १०००/१२०० वर्षे तरी जुन्या आहेत हे लक्षात येते. सातार्‍याच्या ह्या भागावर राज्य होते ते शिवभक्त शिलाहारांचे तेव्हा यांच्याच राजवटीत ही लेणी खोदली गेलेली असणे हे सहज संभवनीय आहे. पण हा सगळाच लेणीसमूह तांत्रिक शिवभक्तीचा प्रकार वाटतो. सुरुवातीच्या एका गुहेत सयोनी शिवलिंगे तर त्याच्या शाळूंकेभोवतीच कोरलेली लहान लहान शिवलिंगे अशा स्वरूपाचा शिवलिंगांचा एक समूहच दृष्टीस पडतो तर बाजूच्या दोन गुहांमध्ये विशाल शिवलिगे दृष्टीस पडतात एका गुहेमध्ये कमरेएव्हढे पाणी तर दुसरी गुहा कोरडी आणि त्यातही गंमत म्हणजे शिवपिंडीच्या शाळूंकेचा निमुळता भाग हा नेहमी लिंगाच्या उजव्या बाजूकडे असतो येथे मात्र लिंगाच्या डाव्या बाजूला कोरलेला आहे. हा तंत्रपूजेचा एक प्रकार दिसतो.
  विशाल शिवलिं
 शिवपिंडी समूह
पश्चिमाभिमुख लेण्यात एकच मोठे शिवलिंग आहे तर यात नवग्रहपट देखील ठेवला आहे. दुसऱ्या क्रमांकाच्या लेणीमधे तीन शिवलिंगे व शिल्पे आहेत. पाट्याच्या आकाराच्या दगडावर वैविद्यपूर्ण शिवलिंग सुबकपणे कोरल्याचे पाहावयास मिळते आणि श्री पाटेश्वर या नावाचा काही संदर्भ याच्याशी निगडीत आहे की नाही हे सांगणे कठीण आहे. मध्यभागी असलेल्या लेण्यात विविध शिवलिंग व शिव अवतार कोरले असून अत्यंत महत्त्वाचे म्हणजे 'रुद्रलिंग' व ४८ लिंगे असलेले लिंग आहे. ह्या लेणीच्या पुढ्यातच अजून एका गुहेत एक अद्भूत मूर्ती आहे. हा मुळचा गुहेचाच भाग पण याच्या बाजूने आता मंदिरासारखे बांधकाम केलेले आहे.हे उत्तरमुखी अग्नीवृषाचे मंदिर आहे. सुमारे अठराव्या शतकात याचे बांधकाम झाले असावे. या मंदिराचे शिखर हे योगी किंवा ऋषींच्या समाधीस्थानाच्या शिखरासम भासते. 
     आतली मूर्ती संपूर्ण कोरीव आहे. बैलासारख्या दिसणार्‍या चेहर्‍यात मानवी मुख कोरलेले आहे. ही मूर्ती आहे अग्नीची-अग्नीवृषाची. सात हात, प्रत्येक हातात कोरलेले आयुध किंवा हस्तमुद्रा, दोन मस्तके, तीन पाय असलेली ही मूर्ती समोरून न पाहता बाजूने पाहिली असता हुबेहुब नंदीचीच दिसते. समोरून पाहताच दाढीधारी मानवाच्या बसलेल्या मूर्तीचे दर्शन होते मात्र आत जाऊन पाहिल्यावर लक्षात येते की त्या साधूच्या पाठीशी वृषभ आहे.हा आभास साधण्यासाठी दाढी मध्ये दोन खाचा कोरलेल्या आहेत, त्या बैलाच्या नागपुडी प्रमाणे दिसतात.या मुर्तीचे, सौंदर्य, प्रमाणबध्दता, व शिल्पकाराची कल्पकता "अग्नी-वृष"ची मुर्ती प्रत्यक्ष पाहूनच अनुभवता येते. मानव व वृषभ यांची ही अग्नीवृषाची मूर्ती म्हटली जाते. समोरच्या बाजूने दिसणारा दाढीधारी मानवाला सात हात असून प्रत्येक हातातील विविध आयुधे मोठ्या कल्पकतेने शिल्पात कोरली आहेत. 
ऋग्वेदातील चौथ्या मंडलातील ५८ व्या सूक्तातील तिसर्‍या श्लोकात याचे वर्णन पुढील प्रकारे आले आहे आणि ही मूर्ती अगदी त्याबरहुकूम बनवण्यात आली आहे.
चत्वारि शर्ङगा तरयो अस्य पादा दवे शीर्षे सप्त हस्तासो अस्य |
तरिधा बद्धो वर्षभो रोरवीति महो देवो मर्त्यां आ विवेश ||
अग्नी हा ४ शिंगे, ३ पाय, २ मस्तके, ७ हस्त आणि ३ ठिकाणी बांधलेला एक वृषभच आहे.
  अग्नीवृष
 हा लेणीसमूह बघून थोडे अजून पुढे जाताच अजून एक लेणीसमूह दृष्टीस पडतो तटांनी बंदिस्त केलेले प्रवेशद्वार, प्रवेशद्वारातच कोरलेला नंदी आणि आतल्या बाजूला तीन गुहांचा समूह अशी याची रचना. हा नंदी पण वेगळ्याच  तर्‍हेने कोरलेला आहे. मूर्ती अतिशय देखणी आहे पण जणू काही हा नंदी कुठे पळून जाऊ नये म्हणून त्याला साखळदंडाची अतिशय घट्टपणे वेसण घातलेली आहे. भक्तीपेक्षा हा प्रकार भयाचाच जास्त वाटतो.
  लेणीसमूहाच्या प्रवेशद्वारातील नंदी
 शिवलिंगाची पट्टी कोरलेले प्रवेशद्वार
 चतुर्मुख शिवलिंग
 घट असलेले शिवलिंग

एका दगडावर दोन शिवलिंगा ऐवजी दोन कलश दिसतात, ती 'कुंभेश्वर' किंवा 'चतुर्मुख लिंग' या नावाने संबोधले जाते. 

 लेणीसमूह एका वेगळ्याच कोनातून

यापुढील वर्‍हाडघर हा ३ लेण्यांचा समुह आहे.  येथे शिवपार्वती विवाह समयी लग्नाला  आलेले सर्व देवदेवता व-हाडी राहिले होते अशी दंतकथा सांगितली जाते. ह्या व-हाडघरच्या प्रवेशद्वाराच्या समोरच्या बाजूला असलेली एकमेव दगडी दीपमाळ अखेरच्या घटका मोजत आहे कारण दिपमाळेचा वरपासून मध्यापर्यंचा अर्धा भाग जमीनदोस्त झाला आहे. व-हाड घरात प्रवेश करताना ' सवत्सकामधेनू'चे शिल्प प्रथम दृष्टीस येते. जमीनीवर सुंदर नंदी आहे असून त्याच्या गळ्यातील घंटेखाली लाडूने भरलेले भांडे दर्शविले आहे. आतील व्हरांड्यात गेल्यावर एका भल्या मोठ्या वाड्यात गेल्याचा भास होतो. मधील व्हरांड्यातून निरभ्र निळे आकाश दिसते तर तीनही बाजूला बांधकाम केलेले आहे तर एका बाजूला असलेल्या खडकातील लेण्या आहेत. समोरच्या खडकात खोदीव दालनातील शिवलिंग पाहून तत्कालीन शिवभक्तीची कल्पना मनाला सुखावते. मध्यभागी भव्य शिवलिंग आहे तर यावर लहान लहान शिवलिंग कोरलेल्या असून एकाच दर्शनात शेकडो वेळा शिवदर्शन घेतल्याचे पुण्य लाभते. आत प्रवेश केल्यावर डावीकडे विविध मूर्तीच्या पाठीमागे शेकडो शिवलिंग कोरलेल्या लेण्याच्या भिंतीचा भाग आहे.    
पाटेश्वरातील सर्वात जास्त अद्भूत शिवलिंगे ह्याच लेणीसमूहात साकारली गेली आहेत. ह्या लेणीसमूहातील तीनही लेण्यांची वैशिष्ट्ये म्हणजे इतल्या गुहांच्या प्रवेशद्वारावर गणेशपट्टीऐवजी शिवलिंगे कोरलेली आहेत. लिंगायतांच्या देवळांत हा प्रकार प्रामुख्याने पाहावयास मिळतो. गुहांच्या बाहेरील बाजूस दोन वेगळ्या प्रकारची शिवलिंगे कोरलेली दिसतात त्यातले एक म्हणजे चतुर्मुख शिवलिंग. शिवलिंगावर चार दिशांत कोरलेल्या चार मस्तकांनी हे शिवलिंग बनलेले आहे. ही चार मुखे म्हणजे ब्रह्मा, विष्णू, महेश आणि सूर्य यांचे प्रतिक. तर याच्या बाजूलाच असलेले दुसरे शिवलिंग याहूनही अद्भूत. याच्या शाळूंकेवर लिंगाऐवजी चक्क दोन उपडे घटच कोरलेले दिसतात. तर त्याच्या बाजूने काही अयोनी स्वरूपातील लिंगे कोरलेली दिसतात.
 ही शिवलिंगे बघून उजवीकडच्या गुहेत गेलो असता अजूनच काही वेगळ्या प्रकारची शिवलिंगे दृष्टीस पडतात. ही गुहा त्रिस्तरीय रचनेची जणू काही एकात एक तीन गुहा खोदलेल्या आहेत. हा भाग पूर्ण अंधारी आहे. सुरुवातीच्या भागात दोन चौकोनी शाळूंकांवर शिवपिंडीच्या जागी कमलफुलांची सुंदर रचना दिसते तर अंधारात जरा डॉळे सरावल्यावर ह्याच्याच बाजूच्या एका भिंतीत एक आगळी मूर्ती कोरलेली दिसते. बैलाच्या पाठीवर चक्क एक शिवलिंगच कोरलेले दिसते. जणू हा नंदी शंकराला आपल्या पाठीवर वाहून नेत आहे. ह्याच गुहेच्या आतल्या भागात एका शिवलिंगाच्या भोवती शाळूंकेवर अयोनी लिंगे कोरलेली आहेत तर दुसर्‍या एका शिवपिंडीचे लिंगच अयोनी लिंगानी भरून गेलेले दिसते. तर अजून एका बाजूला यज्ञवेदीसारखे एक सहस्त्र शिवलिंग दिसते त्यावरही हजार अयोनी लिंगे कोरलेली आहेत
 कमलफुलाचे लिंग व शिवलिंगवाहू नंदी
 अजून काही वेगळे प्रकार
 सहस्त्र लिंग
त्या गुहेतून बाहेर येऊन डावीकडच्या एका गुहेत तर अजून वेगळीच गंमत. ह्या गुहेत विविध तर्‍हेची शिवलिंगे एकामागोमाग एक अशी रचलेली आहेत. काही शिवलिंगांवर लिंगाऐवजी दोन खड्डे तर काहींवर पिंडी मात्र ह्या सगळ्या शिवपिंडीच्या सभोवतीने असंख्य लहान लहान अयोनीज लिंगांनी फेर धरलेला आहे.त्याचप्रमाणे दशवतार, अष्टमातृका, माहेश्वरी, नवग्रह, शेषशायी विष्णू, चामुंडा, कार्तिकेय इत्यादी शिल्पे कोरलेली आहेत. या लेणी समुहास " बळीभद्र " लेणी समुह म्हणतात. या दुसऱ्या लेणीसमूहापासून तिसऱ्या लेणीसमूहाकडे जाताना दुसऱ्या लेणीसमूहाशेजारीच लहान वटेश्वर मंदिर आहे.
डावीकडच्या गुहेतील शिवलिंगे
तेथीलच एक शिवलिंग
ही गुहा बघून आता समोरच्या मुख्य गुहेत प्रवेश केला. ह्या गुहा अत्यंत रहस्यमय, सर्वात मोठी आणि शिवलिंगांचे विविध प्रकार असलेली. इथे मध्ये प्रमुख असलेले भलेमोठे शिवलिंग, त्यावर कोरलेली अयोनीज शिवलिंगे, आणि बाजूच्या तीन्ही भिंतीवर प्रत्येकी एक एक असे तीन शिल्पपट कोरलेले शिवाय बाजूला इतर शिवलिंगेही आहेतच. शिवलिंगाचे हे प्रकार मात्र अष्टोत्तरशत किंवा सहस्त्र लिंगाचे. यांमध्ये शाळूंकेवर असलेल्या शिवलिंगात १०८ किंवा १००० लहान लहान लिंगे कोरलेली आढळतात. येथेच बाजूला एक धारालिंगही दिसते. यामध्ये शिवलिंगावर उभ्या पन्हाळ्या पाडलेल्या असतात जेथे दोन नलिका मिळतात तेथे साहजिकच धार उत्पन्न होते म्हणून हे धारालिंग अथवा नलिकालिंग.
बाजूच्या भिंतीवरील एका शिल्पपटामध्ये देवीचे-पार्वतीचे शिल्प कोरलेले आहे. तर त्याभोवती लहान लहान अयोनीज लिंगे कोरलेली आहेत. ती आहेत एकूण ९७२. देवीची १०८ सिद्धपीठे आणि प्रत्येकी पीठाची ९ वेळा पूजा करायचा असलेला प्रघात बघता हा आकडा बरोबर येतो तो ९७२ म्हणजे हे प्रतिक आहे पार्वतीपूजेचे. मुख्य शिवलिंगाच्या पाठीमागच्या शिल्पपटांत विष्णूमूर्ती कोरलेली असून त्याभोवती १००० शिवलिंगे कोरलेली आहेत. विष्णूसहस्त्रनामाचे एक प्रतिक तर उजवीकडच्या भिंतीवरील शिवलिंगपटांत मध्यभागी सूर्याची मूर्ती कोरलेली असून त्याभोवतीने सुद्धा १००० शिवलिंगे कोरलेली आहेत. सूर्यसहस्त्रनामाचे हे प्रतिक. तर दोन कोनाड्यांमध्ये शंकर आणि ब्रह्मदेव मूर्तरूपात कोरलेले आहे. हे एक प्रकारे शिवपंचायतनच. याशिवाय मंदिरातल्या एका स्तंभावर शिवदंड तर दुसर्‍या एका स्तंभावर नाग कोरलेला असून त्याभोवतीही विविध प्रकारच्या अयोनीज लिंगांनी फेर धरलेला आहे. एका स्तंभावर देवनागरीतील एक बराच अस्पष्ट झालेला एक शिलालेख आहे. तर मध्यभागी असलेल्या प्रमुख शिवलिंगावर एकूण १००५ लहान लहान लिंगे कोरलेली आहेत. हे आहे सहस्त्रलिंग. खूपच अद्भूत आणि दुर्मिळ प्रकाr
मुख्य गुहा त्यामधील सहस्त्रलिंगासह, मागच्या बाजूला एक शिवलिंगपट
शिवलिंगपट
 सूर्यमूर्ती असलेला शिवलिंगपट
 शिवदंड
 नागप्रतिमा
दगडी खांबावर शिवलिंगातून नाग प्रतिकृती कोरलेली आहे म्हणजेच 'कुंडलिन्' आहे.
गुहेच्या मध्यभागातील प्रमुख सहस्त्रलिंग
याशिवाय लेण्यात  देवनागरी लिपीतील (संस्कृत मधील) शिलालेख आहेत, परंतू पुसट झाल्यामुळे शिलालेख वाचता येत नाहीत. बाजूलाच एक समाधीवजा बांधकाम दिसते. त्याच्या बाहेर गरुडाचे आणि मारुतीचे एक शिल्प ठेवलेले दिसते.
     खरे पाहता पाटेश्वरचा हा परिसरच अशा गूढरम्य शिवलिंगांनी नटलेला आहे. काही शिवलिंगांचे अर्थ कळण्यासारखे तर बरेचसे अनाकलनीयच. पण एक मात्र आहे देवळांत नेहमीसारखी जाणवणारी प्रसन्नता इथे मात्र जाणवत नाही. एकाकी, निर्जन परिसर, घनदाट झाडी, दाट काळोख्या गुहा, वापरात नसल्याने येणारा कुबट वास, तंत्रपूजेसाठी बनवलेली शिवलिंगे यामुळे इथे फिरताना काहीसे दडपणच जाणवते.
   हजारो शिवलिंगाचे दर्शन व पुण्य मिळण्याचे भारतातील एकमेव ठिकाण असावे असे वाटते. मूर्ती विज्ञानाच्या अभ्यासकांनी या सर्व मूर्तीचे विश्लेषण करून सामान्य जनांपर्यत याची माहिती उपलब्ध करून द्यावी असे मनापासून वाटते. आपल्या प्राचीनकाळातील पूर्वजांनी केलेल्या अपार कष्टाची महती व हिंदूंच्या धार्मिक दृष्टिकोनातून याचे विश्लेषण होणे फार महत्त्वाचे आहे.
      हजारो वर्षापूर्वीच्या आपल्या पूर्वंजांच्या अपार कष्टाचे थोडे बहूत चीज झाले असे अभिमानाने  म्हणावे वाटते. येथे शिवलिंगाच्या एकमुखी, ७२ लिंग असलेले, मत्स्यकूर्मशिव, यंत्रलिंग, त्रिपीठलिंग, रूद्रलिंग, कुंभेश्वर लिंग, चतुर्भुज लिंग, पंचलिंग, अष्टादशलिंग, त्रिलिंग, शतकलिंग, सहस्त्रलिंग, भैरवलिंग, पंचलिंग व कमललिंग इत्यादींचे मनोभावे दर्शन घेता येईल. त्याचप्रमाणे अज एकपाद, अष्टादशभुजामहालक्ष्मी, शेषशायी, सरस्वती, कार्तिकेय, त्रिपुरा, सुरसुंदरी, अष्टमातृका, नागशिल्प, गरुड, ब्रम्हा, वैनायकी, दुर्गा, अग्निवृष, चामुंडा, नवग्रह, सूर्य इत्यादी मूर्तींचे निरिक्षण करता येईल.
      एकूणात पाटेश्वराच्या अद्भूत लेणीसमूहाचे दर्शन घेण्यासाठी आणि त्याच्या रहस्यमयतेत बुडून जाण्यासाठी पुन्हा पुन्हा खास इथे यायला मात्र हवेच.अगदी रम्य परिसर. इथून पाय काही निघत नाहीत.  इथूनच जवळ जरंडेश्वर आणि नांदगिरी हा किल्लासुद्धा पाहता येईल. दोन दिवस भटकण्यासाठी काढले तर सातारा इथे मुक्काम करून एक दिवस जरंडेश्वर आणि नांदगिरी किल्ला आणि दुसऱ्या दिवशी सहस्रिलगी पाटेश्वर अशी ऐन पावसाळ्यातली निराळीच भटकंती करता येईल. स्वच्छ, सुंदर, निसर्गसंपन्न पाटेश्वर आपल्या स्वागतास कायमच सज्ज आहे. हर हर महादेव !
स्थळभेटी बाबत माहिती
पुणे - सातारा -देगाव. भोजन व्यवस्था पाटेश्वर येथील मठात होऊ शकते मात्र निवास सातारा येथे होऊ शकतो. 



शिखर शिंगणापूर :-

शिखर शिंगणापूरचा शंभू महादेव हा महाराष्ट्रातील अनेकांचे कुलदैवत आहे. महादेवाचे हे मंदिर आणि शिंगणापूर गाव दोनीही यादव कुळातील सिंधण राजाने वसवली आहेत, असे म्हणतात. देवगिरीच्या यादव घराण्यातील सिंघण राजा येथे येऊन राहिला होता. त्यानेच शिंगणापूर गाव वसविले.त्यावरुन गावाचे पूर्वीचे नाव सिंघणापूर पडले असावे. पुढे या नावाचा अपभ्रंश होऊन आजचे शिंगणापूर नाव प्रचलित झाले असावे. 
शिखर शिंगणापूर हे भोसले घराण्याचे कुलदैवत. शिवाजी महाराजांचे आजोबा मालोजीराजे भोसले आपल्या परिवारासह देवदर्शनासाठी येथे येत असत. माण - खटाव हा पूर्वी पासून दुष्काळी प्रदेश होता. त्यामुळे शिखर शिंगणापूरला येणार्‍या भाविकांचे पाण्याच्या दुर्भिक्षेमुळे होणारे हाल पाहून मालोजीराजांनी  इ.स. १६०० साली येथे एक मोठे तळे बांधले, त्यास पुष्करतीर्थ असे म्हणत; त्यालाच आता शिवतीर्थ म्हणतात. आजही हा तलाव शिखर शिंगणापूरच्या टेकडीच्या पायथ्याशी पाहायला मिळतो. शिवाजी महाराजांनी या मंदिराची २ भव्य प्रवेशव्दारे बांधली. त्यातील पूर्वेकडील प्रवेशव्दार ६० फूट उंच असून त्यावर सापाचे सुंदर शिल्प कोरलेले आहे. दुसरे प्रवेशव्दार उत्तरेकडे असून ते ४० फूट उंच आहे. मंदिरापर्यंत येण्यासाठी रस्ता झाल्यामुळे ही दोन्ही महाव्दारे पाहाण्यासाठी वाट वाकडी करून जावे लागते.
         पूर्वीचे देऊळ पडल्यामुळे १७३५ मध्ये शाहू महाराजांनी सध्याचे देऊळ बांधले.वीर सरदार बाजी गोळे यांच्या देखरेखीखाली (हवालदार म्हणून नियुक्ती होती)बांधकाम पूर्णत्वास आले, पुढे १९७८ मध्ये त्याचाही जीर्णोद्धार झाला. दक्षिणेतील रामस्वामी नावाच्या एका स्थापत्यतज्‍ज्ञाकडून शिखराची व मंदिराची डागडुजी करून त्यांना आकर्षक रंग देण्यात आला आहे.त्यावेळेच्या स्थापत्य शैलीवर मुस्लिम स्थापत्याचा प्रभाव होता, हे मुख्य मंदिराच्या आजूबाजूला असलेल्या छोट्या मंदिरांच्या कळसाच्या घुमटाकार आकारावरून सिध्द होते. त्याचवेळी शाहू महाराजांनी मंदिराच्या पश्चिमेला शहाजी महाराज, शिवाजी महाराज व संभाजी महाराज या तिघांची स्मारके (स्मृती मंदिरे) बांधली. आज ही स्मारके दुर्लक्षित व दुरावस्थेत असली तरी पाहाण्यासारखी आहेत. काळ्या पाषाणात बांधलेल्या या स्मारकामध्ये ३ शिव मंदिरे आहेत. मंदिरांच्या व्दारपट्टीवर गणपती कोरलेला आहे. मंदिरांसमोर तुलशी वृंदावन आहेत. मंदिराच्या डाव्या बाजूला कमानीयुक्त ओवर्‍या आहेत.
   या मंदिराचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे मोठ्या घंटा आहेत. या घंटापैकी एक घंटा ब्रिटीशांकडून मंदिराला मिळाली आहे. मंदिराच्या गाभाऱ्यामध्ये दोन शिवलिंग आहेत. त्यांनाच शिव पार्वतीचे प्रतिक मानतात. शिवाजी महाराजांच्या घराण्यामध्ये शिखर शिंगणापूरच्या महादेवाचे अतिशय महत्त्व होते.  
    पुराणातल्या कथेनुसार शिखर शिंगणापूर जवळ असलेल्या गुप्तलिंग या स्थानावर शंकर घोर तपश्चर्येला बसले होते. पार्वती भिल्लीणीच्या रुपात तेथे आली. तांडव नृत्य करून पार्वतीने शंकराची तपश्चर्या मोडली. तपश्चर्या भंग होताच भगवान शंकरांना खूप राग आला. त्यांनी आपल्या जटा तेथील शिळेवर आपटल्या. जटा आपटताच त्या शिळेतून पाण्याचा प्रवाह सुरु झाला. आजही गुप्तलिंगावर गोमुखातून पाण्याचा अविरत प्रवाह सुरु आहे. पार्वतीने शंकराची क्षमा मागितली. पार्वतीच्या याचनेने भगवान शंकर शांत झाले. गुप्तलिंगावर श्री शंभू महादेव आणि पार्वतीचे मिलन झाले. भगवान शंकर आणि पार्वती यांचा विवाह चैत्र शुद्ध अष्टमीला श्री क्षेत्र शिखर शिंगणापूर येथे पार पडला.
     मंदिराला दगडी तटबंदी आहे आणि या मंदिराच्या आवारात पाच मोठे नंदी आहेत.या मंदिराचे शिखर हा स्थापत्यकलेचा उत्कृष्ट नमुना आहे. शिखरावर अगदी नाजुक नक्षीकाम केले आहे. मंदिराच्या आवारात अनेक दिपमाळा आहेत.या मंदिराच्या पश्चिमेकडे अमृतेश्वराचे हेमाडपंथी मंदिर आहे. महादेवाचे हे मंदिर याच डोंगरावर समुद्र सपाटीपासून १,०५० मी. उंचीवर आहे.मंदिरात जायला जवळपास ४०० पायऱ्या चढून जावे लागते. त्यापुढे आणखी थोडे चढून गेल्यावर खडकेश्वर मंदिर आहे. 
मंदिरात चार वेळा पुजा केली जाते. दरवर्षी चैत्र शु. अष्टमीला शंकर पार्वती विवाह सोहळा अगदी साग्रसंगीत साजरा केला जातो. पंचमीला हळदीचा कार्यक्रम असतो. या लग्नासाठी एक भले मोठे ५५० फुट लांब पागोटे विणले जाते. ज्या कुटूंबाला हे काम दिले जाते ते कुटूंब पूर्ण वर्षभर यासाठी मेहनत करते. विवाहाच्या दिवशी या पागोट्याचे एक टोक महादेवाच्या कळसाला तर दुसरे टोक अमृतेश्वराच्या देवळाच्या कळसाला बांधतात.
या महादेवाला अभिषेक करण्यासाठी खालून कावडीत पाणी आणतात. या कावडींमध्ये सगळ्यात मोठी कावड असते ती भुत्या तेल्याची. या कावडीला दोन मोठे मोठे रांजण लावलेले असतात. ते वर घेऊन जाणे हे तसे कष्टाचे काम. आणि मग ज्याच्या अभिषेकासाठी हे पाणी न्यायचे त्यालाच मदतीला बोलवतात. आणि हाकही हक्काचे माणूस असावे तशी म्हणजे, हे म्हादया, धाव, मला सांभाळ अशी. असा सगळा द्रविडी प्राणायाम करत ही कावड वर नेली जाते आणि महादेवाचा अभिषेक होतो.
असं हे शिखर शिंगणापूर ऐतिहासिक, पौराणिक कथांशी जोडलेले एक रम्य ठिकाण आणि तीर्थक्षेत्रही!
  शिंगणापूर टेकडीवरील शिवमंदिराकडे जाताना शांतिलिंग स्वामींची समाधी व त्यापुढे खडकेश्वराचे मंदिर लागते. धवलगिरी किंवा स्वर्णाद्री म्हणून ओळखल्या जाणार्‍या शिखरावर शंकराचे मंदिर असून त्याच्या चारही बाजूला तटबंदी आहे. तटबंदीत चार दरवाजे आहेत. पायर्‍यांच्या मार्गाने चालत गेल्यास आपण जिजाऊ वेशीतून शेंडगे दरवाजा ओलांडून मंदिराच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ पोहोचतो. रस्त्याने आल्यास आपण तटबंदीतील उपव्दारापाशी पोहोचतो. येथून मंदिरात प्रवेश केल्यावर उजव्या बाजूला दोन भव्य दिपमाळा दिसतात. त्याच्या बाजूला नगारखाना आहे. 
काळ्या पाषाणात बांधलेले शंकराचे मंदिर हेमाडपंती पद्धतीचे आहे. मंदिराचे छत १८ दगडी खांबावरती तोललेले आहे. खांबांवरील चौकटीत शिकारीची, मैथूनाची व पौराणिक कथेतील प्रसंगांची शिल्प कोरलेली आहेत. त्यातील एका शिल्पात दोन शरीरे (धड) व एक डोकं असलेला प्राणी दाखवलेला आहे. त्याचे डोके एका बाजूने झाकल्यास बैल दिसतो, तर दुसर्‍या बाजूने झाकल्यास हत्ती दिसतो. मंदिरातील शिल्पकला वेळ काढून पाहाण्यासारखी आहे. दगडी खांबांच्या वरच्या टोकाला यक्ष कोरलेले आहेत. त्यांच्या खांद्यावर मंदिराचे छत तोललेले दाखवण्यात आले आहे. छताचा विस्तार बाहेरील खांबापासून 3 फूट बाहेर आहे. मंदिराच्या गाभार्‍या बाहेर डाव्या बाजूला गणपतीची मुर्ती आहे. गाभार्‍याच्या व्दारपट्टीवर मक्षीकाम केलेले आहे. मंदिराच्या गाभार्‍यात भगवान शंकराचे आणि दुसरे पार्वतीचे अशी दोन लिंग आहेत. गाभार्‍याच्या समोर जमिनीवर दगडात कोरलेले कासव आहे. त्याच्या पुढे ४ नंदी आहेत. त्यांना तांब्या - पितळेचे आवरण घातलेले आहे. मंदिरात पोर्तुगीज बनावटीच्या दोन घंटा असून त्यांच्यावर रोमन लिपीत अनुक्रमे १६७० व १७२० सालांचा उल्लेख आहे. मंदिराच्या आवारात बरीच लहान मंदीरे आहेत. त्यांच्या कळसाचा आकार घुमटाकार आहे.  
मंदिराच्या पश्चिमेकडे अमृतेश्वराचे हेमाडपंथी मंदिर आहे. यास "बळी महादेव" म्हणून देखील ओळखले जाते. मंदिराच्या दक्षिण दरवाज्यातून किंवा रस्त्याने अमृतेश्वर मंदिराकडे जाता येते. मंदिराचे गाभारा आणि सभा मंडप असे दोन भाग आहेत. मंडपाचे छत हे १६ कोरीव दगडी खांबांवर तोललेले आहे.
जाण्यासाठी :- 
सातारा जिल्ह्यातल्या माण तालुक्यामध्ये, सातारा - पंढरपूर रस्त्यावर, सातार्‍या पासून ६४ कि.मी. अंतरावर दहिवडी गाव आहे. दहिवडी गावापासून २२ कि.मी. अंतरावर शिखर शिंगणापूर आहे.  
पुण्याहून फलटण गाठावे. फलटण - दहीवडी रस्त्यावर मोरोची येथे शिखर शिंगणापूरला जाण्यासाठी फाटा आहे. फलटण - शिखर शिंगणापूर अंतर ६४ कि.मी. आहे.  
आजूबाजूची पाहाण्याची ठिकाणे :-
१) वारूगड, महिमानगड व वर्धनगड हे किल्ले शिखर शिंगणापूर मंदिरा बरोबर एका दिवसात पाहाता येतात. 
२) गोंदवले येथील गोंदवलेकर महाराजांचा मठ.
३) फलटण येथील महादेवाचे मंदिर, राम मंदिर, राजवाडा.
४) अकलूजचा किल्ला ४५ किमी.


 


चंद्रगिरीची घळ :-

      खुद्द श्रीसमर्थानी या अद्भूत निसर्गरम्य घळीचे असे सुंदर वर्णन केले आहे. हे वर्णन वाचल्यावर माझे निसर्गवेडे मन या चंद्र गिरीच्या घळीच्या दर्शनासाठी आतुरले. भोवताली गिरिशिखरे, द-याखो-या, गुहा, तळात दिसणारे आकाश, दोन्ही बाजूला अखंड अवखळपणे वाहणा-या कृष्णा व कोयना आणि घळीत जाताना आपण ढगांच्या वर जातो, ढग खालीच राहतात जणू आपण अशा स्वर्गात जात आहोत जेथून परतही येता येते अशा स्वर्गात असे वाटत राहते. असे हे अद्भूत स्वर्गसुख अनुभवावे असे कोणाला वाटणार नाही आणि ते पण “ भक्तजन वेगी धावा। दर्शनासी।। “ या शब्दात खुद्द समर्थ बोलावत असताना! मग चला तर, नव्हे सत्वर धावा........!
         ह्या घळीचे वर्णन काव्यबध्द करण्याएवढी हीचे महत्व समर्थाना का वाटत होते ते पाहाण्यासाठी थोडी तत्कालिन परिस्थिती लक्षात घ्यावी लागेल. १२ वर्षे तीर्थाटण म्हणजे भारतभ्रमण करून समर्थ (वयाच्या३६ व्या वर्षी) कृष्णातीरी आले. तेव्हा धर्मावरील प्राणांतिक संकटाची त्याना कल्पना आली. ही स्थिती लवकर पालटली नहीतर धर्म काही टिकत नाही ह्या चिंतेत समर्थ काय करायचे ते पुढील शब्दात समर्थप्रताप मध्ये आहे-
श्रीगुरूसमर्थ येकांती बैसती। प्रांतीचे लोक दर्शनासी येती ।
सकळ प्रांतीचा स्वामी परामर्श घेती। चिंता करिती विश्वाची।।
     शक १५६६-६७चा तो काळ. त्या भागात शिवरायाने हिंदवी स्वराज्य स्थापण्याची महत्वाकांक्षा बाळगून त्या दिशेने पाऊल टाकण्यास सुरवात केली होती. आधी क-हाड, सातारा,महाबळेश्वर, चाफळ, करवीर जरंडा, इ. ठिकाणी भ्रमण झाल्यावर समर्थानी अखेरीस साता-याजवळचे मसुर येथे तळ दिला. कारण मसुरची पाटिलकी शहाजीमहाराजांकडे होती. या प्रांतात संचार करीत असता समर्थांचे आरंभीचे वागणे वागणे मुद्दामच पिसाटासारखे असायचे. पिसाट रामदास म्हणूनच ते सर्वत्र ओळखले जात. ते निर्भयपणे परिस्थितीचे निरीक्षण करत एकांतात, रानावनात, डोंगरात , घळीतून राहात जेथे एकांतातील चिंतन ध्यान याबरोबरच राजकारणाच्या तजवीजांवर सुध्दा चर्चा चालत असे. ह्या सर्वदृष्टीने चंद्रगिरीची घळ त्यानी निवडली होती.
     ह्या घळीत जाण्यासाठी चाफळ फाट्यावर उतरून चरेगावच्या दिशेने निघावे. वाटेवरचे मोठमोठाले उंचच उंच वृक्ष, पक्षी आपली सोबत करीत असतात. पुढे चाफळच्या रामाचे पदप्रक्षालन करणारी मांड नदी सामोरी येते..मग आपण चरेगावात पोहचतो. पुढची वाटचाल निर्मनुष्य परिसरातून असल्यामुळे ईथेच वाटाड्या सोबत घ्यावा. माळरानाचा चढ दमछाक करणारा आहे. ट्रेक शूज घालून हि खडी वाट चढताना, समर्थ लाकडी खडावा घालून कसा प्रवास करत असतील? हा प्रश्न मनात येतो. बेघर वस्तीमागच्या माळावरील ज्योतिबाच्या छोट्या मंदिरात दर्शन घेऊन झाल्यावर जवळची खिंड उजवीकडे ठेवून आपण चंद्रगिरी चढू लागतो हिरव्याकच्च कमरेपेक्षा जास्त उंचीच्या दाटीवाटीने उभ्या असलेल्या झाडांतून डोकावणा-या रंगीबेरंगी रानफुलांच्या ताटव्यातून मधूनच सरपटणा-यां मित्रांचे दर्शन घेत पाऊल मावेल एवढ्याच रूंदीची पाऊलवाट शोधत पुढे पाउले टाकत असताना समोर काळाभिन्न भलामोठा उंचच उंच कातळ दिसतो. कातळापर्यंतची सरळ उभी अवघड चढण पार करून वर पोहोचल्यावर सहज लक्ष वेधून घेणारे चिंचेचे डेरेदार झाड आहे.त्याच्या वरच्या बाजूला सहजासहजी न दिसणारे भले मोठे विवर आहे. हेच चंद्रगिरीच्या घळीचे प्रवेशद्वार. “चंद्रगिरीचा डोंगर। त्यात गुप्त येक विवर। “हे सुरवातीस लिहिलेले समर्थानी का म्हटले ते तेथे पोचल्यावर कळले. डोंगरउतारावरील झाडझाडो-यात हे “गुप्त” विवर इतके बेमालूमपणे मिसळून गेले आहे की झाडाखालून पाहिल्यास येथे विवर असेल याची कल्पनासुध्दा येत नाही. विवरापर्यंत कसेतरी सर्कस करीत पोहोचल्यावर सर्वत्र नाग-सापानी टाकलेल्या कातीचा खच पडलेला दिसतो. त्या लटकणा-या कातीमुळे सगळीकडे नैसर्गिक रित्या झिरमिळ्यांची आरास तयार झाली होती.”जय जय रघुवीर समर्थ “ची गर्जना करीत निर्भिडपणे विवरात प्रवेश केला. समर्थांच्या वास्तव्याने पावन झालेल्या या घळीतील धुळ मस्तकी लावली तेव्हा मन समर्थमय होते.
या घळीला तीन दालने आहेत. बाहेरचे दालन पडवीसारखे छोटे, दुसरे मुख्य घळ आणि तिसरा भाग विवरे. प्रवेशद्वाराजवळ विश्रांतीसाठी लहान ओसरी आहे. येथे मुख्य घळीत जाण्यासाठी साधरण तीन साडेतीन फूट उंच दरवाजा आहे.. हे इथले वैशिष्ठ्य. इतर कोणत्याही घळीला अशी दरवाज्याची दगड रचून केलेली कृत्रिम चौकट नाही. मुख्य घळ समर्थांचे देवतार्चन करण्याचे दालन असावे कारण आतून दिसणारा घळीचा हा वरचा भाग मंदिराच्या कळसा प्रमाणे आतून निमुळता आहे. मुख्य घळीत सर्वत्र छोटीछोटी विवरे आहेत. ही एकांतवासासाठी वापरली जात असावीत कारण एक माणूस बसू शकेल एवढी ही छोटी आहेत. येथे थंडीच्या दिवसात उबदार वातावरण असते हे स्वत: समर्थानी अनुभवले आहे
या घळीत समर्थ ऱाहण्यास येण्यापूर्वी एक वाघ राहात असे. त्यास त्यानी हुसकून देऊन दुसरीकडे जाण्यास सांगीतले आणि आपण स्वत: त्या घळीत राहू लागले (पहा समर्थप्रताप ३-६१).
ओसरीवर बाहेर पहात विश्रांती घेताना खाली नजर टाकली तर छोटीछोटी गावे, कौलारू घरे, शेती, मुंगीएवढे दिसणारे शेतातील कष्टकरी, डोंगरउतारावर चरत असलेली गुरे, उनाडक्या करत असलेली गुराख्याची पोरे, तळबीड गावानजिकच्या वसंतगड, लांबवर दोन्ही तीरावर हिरवेगार वृक्ष संभाळत डौलात वहाणारी कोयना, दूर क्षितीजावर चाफळच्या मागचा आकाशात डोके खुपसून बसलेला शिंगणवाडीचा डोंगर हे सर्व न्याहाळणे म्हणजे अवर्णनीय सुख... समर्थांच्याच शब्दात..“जागा सुंदर गहन। तेथे सुखावले मन “।
या घळीबद्दल मौन बाळगणारा इतिहास आणि घळीची दुरावस्था ही समर्थप्रेमींसाठी खेदजनक गोष्ट आहे. एकेकाळी पुष्पमाला, धूपचंदन सुगंधाने दरवळणारी ही घळ पशुपक्ष्यांच्या घाणीने कुबट दुर्गंधीमय झाली आहे.
हनुमंताला अकरावा रूद्र समजतात.म्हणजे मारूती हा शंकराचा अवतार होय. या रूद्रावतारात स्वत: कैलासनाथाना रामरायाच्या सेवेचे भाग्य लाभले आणि समर्थ स्वत: तर राम-हनुमंताचे दास, दासांचे भक्तांचे कोडकौतुक पुरविणे हे परमेश्वराचे आवडते कार्य म्हणूनच समर्थ या चंद्रगिरीच्या घळीत आल्यावर “ समर्थे चंद्रगिरी निवास केले । पंचाननेसी समर्थ भांडले।। कैलासनाथ प्रकट झाले। श्रीरघुनाथस्थापना करावया।।“ अशा रीतीने स्वये श्रीकैलासनाथानी समर्थाना चंद्रगिरीत प्रतिकैलास निर्माण करून दिला आणि ते स्वत: हनुमंताच्या रूपाने घळीत वास्तव्य करून राहीले..... “रामदासाचा विसावा। रूद्र जाहला आक्रावा।।.”... आणि म्हणूनच समर्थानी “भक्तजन वेगी धावा। दर्शनासी।। “असे आपल्याला आमंत्रण दिले आहे.  याच चंद्रगिरी घळीत वसंतगडाव वरुन देखील जाता येते.

 मोरबागची मोरघळ : -

   जशी चाफळजवळची हि रामघळ तशीच समर्थांच्या स्मृती बाळगणार्‍या सज्जनगड उर्फ परळीच्या किल्ल्याच्या परिसरात आणखी एक घळ आहे, मोरघळ.मात्र रस्त्याची अवस्था विचारात घेता या परिसरात पावसाळ्यात न येणच योग्य ठरेल. ईथे रस्ते खचण्याचे प्रमाणही जास्त आहे, त्यामुळे दिवाळी ते मे महिना हाच ईथे येण्याचा योग्य कालावधी. आपण सज्जनगडाकडून ठोसेघरकडे येताना उजव्या हाताला एक डांबरी सडक पांगारे गावाकडे जाते. डांबरी रस्ता पांगारे गावापर्यंतच आहे. पुढे कच्चा रस्ता पळसवडे गावाकडे जातो. वाटेत पांगारे व पळसवडे अशी दोन छोटी धरणे पहायला मिळतात.
वाटेत उजव्या हाताला सज्जनगड व त्याच्या मागे अंजिक्यतारा दिसत असतो. पळसवडे गावाच्या अलिकडे एक कच्चा गाडीरस्ता डाव्या हाताला जातो. हा रस्ता मोरबाग या धनगरवस्तीकडे जातो. मात्र मोरबाग येण्याआधीच छोटी पायवाट डावीकडे जाते. हि वाट शेताच्या कडेकडेने चढून एका तीन मुखांच्या गुहेकडे पोहचते.
हिच आहे समर्थांनी तप केलेली "रामघळ".गुहेच्या बाहेरच भगवा ध्वज फडकत असतो.
बाहेरुन एकच मुख दिसत असले तरी आतुन या गुहेचे तीन भाग पडलेले आहेत. पैकी मधल्या भागात थोडे वीट बांधकाम करुन काही देवांच्या मुर्त्या व नंदी ठेवले आहेत.
ईथे मागे गेल्यास आणखी चिंचोळी झालेली गुहा दिसते. याच्या आत सरपटत जाण्याचा मी प्रयत्न केला, तेव्हा पुढे बर्‍याच गुहाचे जाळे आहे असे लक्षात आले. मात्र साप, विंचवासारख्या प्राण्यांचे भीती आणि पुरेशी तयारी नसल्याने ईथेच थांबलो.
उजवीकडे असलेली गुहा चिंचोळी झाल्यामुळे फार पुढे जाता येत नाही.
डाव्या बाजुला छोटी गुहा असुन आतमधे वटवाघळे आहेत. आमची चाहुल लागताच त्यांनी बाहेर पोबारा केला. बहुतेक आम्हीच त्यांना वामकुक्षीतून ऊठविले असेल. एकुण रामघळ पहाणे एक थरारक अनुभव आहे. सर्वांनाच कदाचित शक्य होणार नाही, पण साहसी मंड्ळीनी त्याची जरुर अनुभुती घ्यावी.
रामघळीच्या बाजुनेच एक रस्ता वर पठारावर चढतो. हे चाळकेवाडीचेच पठार आहे.प्रंचड पसरलेल हे खडकाळ पठार प्रत्येक ऋतुत वेगळे सौंदर्य दाखविते. या पठारावर भटकून पुन्हा खाली आलो तेव्हा त्या शेताडीच्या टोकाशी एकुलते एक घर दिसले. शहरी सुखसोयीला चटावलेल्या आपणाला अश्या परिस्थितीत रहायची कल्पनाच करवत नाही. मोरबाग या गावातुन पुढे सांडवली या गावी कच्चा रस्ता जातो, व सांडवलीतुन आपण आणखी एक धबधबा पाहु शकतो, पण ईतकी गैरसोय सहन करुन जाण्यापेक्षा केळवलीकडून हा धबधबा पहाणे सोयीचे.

 

 वामन पंडीत समाधी भोगाव : -

       वामन नरहरी शेष (वामन पंडित) (इ.स.१६३६ ते १६९५) हे १७ व्या शतकात होऊन गेलेले मराठी कवी होते.वामन पंडितांबद्दल खात्रीची माहिती मिळत नाही. कोणी वामन पाच आहेत असे समजतात. ठिकठिकाणच्या दोन भिन्न गोत्रांच्या उल्लेखामुळे कोणी वामन दोन होते असेही मानतात. वामन पंडित हे रामदासकालीन कवी होते. त्यांच्याविषयी थोडी माहिती उपलब्ध आहे. त्यांचे काव्य विविध आणि विपुल आहे. वामन पंडितांचा जन्म नांदेडचा समजला जातो. मूळ विजापूरचे रहिवासी. यांच्या आईचे नांव लक्ष्मीबाई. लहानपणापासून विद्याव्यासंगी व बुद्धिमान होते असे म्हणतात. लहानपणीच फारशी भाषेचा अभ्यास केला होता. यांनी काही दिवस विजापूरच्या दरबारी काढले. पण जेव्हा विजापूरच्या बादशहास त्यांना बाटवावे असे वाटले तेव्हा त्यांनी विजापूर सोडले. उदरनिर्वाहाकरिता काही दिवस भिक्षावृत्तीवर ठिकठिकाणी हिंडून पुढे काशीक्षेत्री प्रयाण केले. तेथे एका मध्वमतानुयायी गुरूजवळ वेद व शास्त्रे यांचा उत्तम अभ्यास केला. या विद्येच्या जोरावर ठिकठिकाणी पूर्वपक्ष व उत्तरपक्ष करून अनेक सभा जिंकल्या व विजयपत्रे मिळविली. वामन पंडित प्रथमतः द्वैतमतवादी असले, तरी त्यांच्या मनाचे त्या विचारसरणीने समाधान होईना. त्यामुळे त्यांनी निरनिराळया मतांच्या ग्रंथांचे अवलोकन करून अनेक शास्त्रीपंडितांच्या गाठीही घेतल्या, परंतु मनाचे समाधान झाले नसल्याने निराशेने कंटाळून शेवटी आत्मत्यागाच्या विचारापर्यंत त्यांची मजल गेली होती. ते पुढे मलयाचल पर्वताकडे गेले. तेथे त्यांना एका यतीने गुरूपदेश दिला. ही हकीकत त्याने 'निगमसागर' नांवाच्या ग्रंथात आरंभी विस्ताराने दिली आहे. निगमसागर ग्रंथ शके १५९५ मध्ये लिहिल्याचा त्या ग्रंथातच उल्लेख आहे.
  वामन पंडित यांच्या नावावर निगमसार, समश्लोकी, यथार्थदीपिका, चित्सुधा, तत्त्वमाला, श्रुतीसार कर्मतत्त्व, राजयोग, गीतार्णव सुधा इत्यादी ग्रंथ, काही छोटी प्रकरणे असे लेखन आहे. वामन यांनी रामजन्म, अहिल्योद्धार, सीतास्वयंवर, भरतभाव, लोपामुद्रासंवाद, कृष्णजन्म, बालक्रीडा, वनसुधा, वेणुसुधा, मृतिकाभक्षण, कंसवध, भामाविलास, राधाविलास, कात्यायनीवृत्त, गजेंद्रमोक्ष अशी आख्याने रचली आहेत. त्यांच्या आख्यानात नाट्यपूर्णता, रूपकात्मकता, आकर्षकता, कल्पकता, रचनेचा सफाईदारपणा, शब्दरेखाटन कौशल्य आढळते.
      वामन पंडित यांचा मराठी व संस्कृत या दोन्ही भाषांवर समान अधिकार होता. त्यांची श्लोकाबद्दल विशेष ख्याती आहे. ‘सुश्लोक वामनाचा’ अशी त्यांची प्रसिद्धी आहे. यमक, अनुप्रास, स्वभावोक्ती हे त्यांचे आवडते अलंकार होते. त्यांनी त्यांचा हव्यास अधिक केल्याने त्यांना ‘वामक्या-वामन’ असेही म्हणत. वामन यांनी समश्लोकी टीका लिहिल्यानंतर ‘जगदुपयोगी’ अशी टीका लिहावी अशा आशयाची सूचना वामन यांना त्यांचे अनेक शिष्य, संत, भक्तयोगी यांनी केली. त्या सूचनेतून ‘यथार्थदीपिके’चा जन्म झाला. वामन यांनी इतर टीकाकारांचा उपहास केला आहे. वामन यांनी त्यांच्या टीकेला भावार्थदीपिकेच्या पार्श्वभूमीवर ‘यथार्थदीपिका’ असे नाव दिले आहे. धोमच्या अलीकडे भोगाव. तिथे कृष्णाकाठावर वामनपण्डिताची समाधी त्याच्या कुण्या एका भक्ताने बांधलेली आहे.a
समाधीच्या अलीकडेच एक दुर्लक्षित शिवमंदिर बघायला मिळालं. मूळ स्तंभ खूप जुने, यादवकालीन आहेत तर वरचा अर्धा भाग पेशवेकाळात बांधला गेलाय असे त्याच्या मिश्र शैलीवरुन सहजच दिसते.

भोगाव वाई पर्यटनामध्ये वाई, पसरणी, मेणवली, धोम यांच्याबरोबरच मेणवली, धोममध्ये असणारं भोगाव देखील पाहण्यासारखं आहे. या मार्गावरून प्रवास करताना या गावाबद्दल नेहमीच काहीतरी वेगळं वाटायचं. एके दिवशी गावात चौकशी केल्यावर समजलं की इथे वामन पंडितांची समाधी आहे. वामन पंडित हे नाव कधीतरी ऐकलेलं वाचलेलं होतं; पण कधी ते आठवेना. आणि एकदम लक्षात आलं की, इयत्ता सातवीच्या वर्गात वामन पंडितांची एक आर्या आम्हांला अभ्यासाला होती.
  सुश्लोक वामनाचा अभंगवाणी तुकयाची ओवी ज्ञानेशाची आर्या मयूरपंताची हा श्लोक आठवल्यावर या ठिकाणाबद्दल कुतुहल निर्माण झालं आणि आश्चर्य वाटायला लागलं की एवढ्या मोठ्या कवीची आणि टीकाकाराची समाधी आपल्या जिल्ह्यामध्ये, सातारा, वाईच्या जवळ आहे, पण मराठी भाषेचा अभ्यास करणाऱ्या आणि आमच्यासारख्या गावोगाव भटकणाऱ्या मंडळींना देखील याची माहिती नाही. मग आम्ही गाडी गावाच्या दिशेने वळवून ही समाधी पाहायचा निर्णय घेतला.
भोगाव गावाच्या बाजूला, कृष्णा नदीच्या तीरावर वामनपंडितांची समाधी आहे. समाधीच्या अलीकडे १६व्या शतकाच्या सुमारास बांधलेलं शंकर मंदिर आहे. हेमाडपंती पद्धतीतील हे मंदिर वाई गावातील मंदिरांची आठवण करून देणारं आहे. मोकळ्या आवारामध्ये रस्त्याच्या बाजूलाच शिवमंदिर आहे. मंदिराचा शिखराचा भाग थोडा पडझड झालेला आहे, बाकी सर्व मंदिर सुस्थितीत आहे. इथून लगेचच घाटावरती, पत्र्याच्या मोठ्या शेडमध्ये वामन पंडितांची समाधी शिळा आहे. अलीकडच्या काळातच त्याच्या भोवताली फरशा वगैरे बसविलेल्या आहेत. समाधी शिळेला शेंदूरी रंग लावला असून त्यावर एके ठिकाणी संगमरवरावर लेख लिहिलेला आहे. तो म्हणजे -
श्री वामन पंडितांची समाधी असे तरी ।
पुढे आर्या प्रबंधाने शिळा सर्वांस सूचवी ।।
ज्याने यथार्थदीपिका नामसुधा निगमसार समश्लोकी ।।
रचिली श्रुतीकल्पकता इत्यादिका नमुनिशेष पर्यकी ।।
जन्म शके १५.. समाधी शके १६१७, जीर्णोद्धार शके १८४३ पुण्यतिथी वैशाख शुद्ध ६.
     या लेखामध्ये उल्लेख केलेला यथार्थदीपिका हा ग्रंथ बावीस हजार श्लोकांचा आहे. यामध्ये त्यांनी गीतेवर टीका केलेली आहे. त्यांचा निगमसार हा एक महत्त्वपूर्ण ग्रंथ आहे.
अशा या वामनपंडितांची समाधी आणि त्याच्या बाजूचा परिसर नक्कीच पाहण्यासारखा आहे.
 सातारा - भोगाव अंतर ३९ कि.मी. आहे. गावात खाण्या-पिण्याची सोय

 जंगली जयगड  

महाबळेश्वर येथे उगम पावलेली कोयना नदी सुरवातीला पश्चिमवाहीनी होते, मात्र सह्याद्रीच्या रांगेमुळे ती सुरवातीला दक्षिणवाहिनी आणि नंतर पुर्वेकडे वळते. प्रतापगड, मधुमकरंदगड यांना सामावणारी सह्याद्रीची मुख्य रांग आणि वनकुसवडे पठार यांच्या मधल्या अनुकुल भौगोलिक परिस्थितीचा फायदा घेउन १९६२ मधे कोयना धरणाची उभारणी झाली. कठीण बेसाल्टच दगडापासून बनलेल्या सह्याद्रीला आतून पोखरून वीजनिर्मितीसाठी टप्पा १ व २ उभारले गेले. या सगळ्या विकासकामाचा एक प्राचीन दुर्गराज साक्षी होता, तो म्हणजे "जंगली जयगड".
 ( कुंभार्ली घाटातून होणारे जंगली जयगडाचे दर्शन )
          कोयना नदी म्हणजे सुजलाम, सुफलाम महाराष्ट्राच्या संपन्नतेत भर घालणारी एक भाग्यदायी नदी. महाबळेश्वरास उगम पावून कराडजवळ कृष्णेत समर्पित होणाऱ्या कोयना नदीने एक देखणे खोरे निर्माण केले आहे. या नदीवर जेव्हा हेळवाक जवळ कोयना धरण उभारले गेले तेव्हापासून कोयनानगर पर्यटनाच्या नकाशावर आले. या कोयनानगरजवळील रामघळ व भैरवगड तसे डोंगरयात्रींना परिचयाचे, पण समुद्रसपाटीपासून १०२९ मीटर (३१६४ फुट )उंचीवर उभा असणारा जंगली जयगड मात्र डोंगर भटक्यांना फारसा माहिती नाही.
(जंगली जयगड परिसराचा नकाशा )
    उन्हामुळे बरेच दिवस कुठे भटकंती न झाल्याने खुप मोठा उपवास घडला होता. आता एखादा कस पहाणारा ट्रेक करुनच समाधान मिळणार होते. कोयनेच्या आसपासचे बरेच काही पाहून झाले असले तरी जंगली जयगड अद्याप पाहिला नव्हता, त्यामुळे मे महिन्याचे रणरणीत उन विचारात घेउन जंगली जयगडावर एकमत झाले. एका भल्या पहाटे बाईकवरून मी व माझा मित्र प्रशांत निघालो. कोयनानगरला बटाटेवड्यांना पोटात ढकलून मुक्ती दिली आणि नेहरु गार्डन मागे टाकून नवजाच्या दिशेने निघालो. ओझर्डेचा तीन धारात कोसळणारा धबधबा आणि लेक टेपिंगच्या यशस्वी प्रयोगानंतर नवजा एकदम प्रकाशझोतात आले. कराडवरुन चिपळूणला जाण्यासाठी कोयनानगर-हेळवाकमार्गे कुंभार्ली घाट आहे तसेच दुसरा घाटमार्ग नवजामार्गे पंचधारा बोगद्यामार्गे वीजनिर्मितीच्या तिसर्‍या टप्प्याजवळून उतरतो. मात्र सुरक्षेच्या कारणाने हा घाटमार्ग सध्या खाजगी गाड्यांना बंद आहे. याच रस्त्यावर जंगली जयगडावर जाणारी वाट आहे एवढीच आम्हाला माहिती होती.
मस्त वळणदार रस्त्याने उजव्या हाताला कोयनाधरणाचे निळेशार पाणी ठेवत आमचा प्रवास चालु होता.
मधेमधे डोंगराच्या नैसर्गिक रचनेमुळे धरणाच्या पाण्याच्या जीभा रस्त्याला येउन भिडत होत्या. अखेरीस नवजाला पोहचलो. इथे सरपंचांच्या घरी गाडी लावली आणि पायीच बोगद्याच्या दिशेने तंगड्या तोडू लागलो. पावसात एन भरात वहाणारा धबधबा कोरडा ठाक पडला होता.
इथे पाचवा टप्पा करण्याची शासनाची योजना आहे म्हणे, कदाचित त्यानंतर हा धबधबा वर्षभर वहाता राहिलही. दिवस चढायला लागला तसे चालणे अवघड वाटु लागले. अखेरीस बोगद्याजवळ येउन पोहचलो, पण तिथे विचारावे कोणाला? थोड्यावेळात एक ट्रक धुळ उडवित आला, त्याला हात केला आणि गडाविषयी विचारले. त्याने रस्त्याजवळून चढणारी वाट दाखवली आणि एकदाची चढाई आम्ही सुरु केली. वाटेत झाडावर कोणीतरी बाण काढले होते, त्यामुळे चांगलीच मदत होत होती.  मुळात भटक्यांची हौस सह्याद्री पुरी करतोच, पण ईथे तर जंगलसफारीचा बोनस मिळाला होता.
    आम्ही जरी बाईकने आलो असलो तरी एरवी जंगली जयगडाला जाण्यासाठी सातारा जिल्ह्यातील कोयनानगरपासून १० कि.मी. अंतरावर नवजा हे गाव लागते. या गावातूनच ५-६ कि.मी. किल्ल्यावर जाण्यास फाटा आहे. यासाठी कोयनानगरहून नवजाला जाण्यासाठी  ८.००, ९.००, १०.१५, १२.१५, २.१५ ( दु), ४.१५, ५.३० अश्या बस आहेत तर नवजावरुन  ८.३०, ९.३०, १०.४५, १२.४५, २.४५, ४.४५, ६.०० अश्या परतीच्या बस आहेत. याशिवाय कोयनानगरवरुन खाजगी जीपसुध्दा नवजाला जातात. मुळात जंगली जयगड आणि आसपासची गावे हा सर्व भाग कोयनाप्रकल्प आणि वनखात्याअंतर्गत संरक्षित करण्यात आलेला आहे. त्यामुळे येथे पर्यटकांना मुक्तपणे फिरता येत नाही. यासाठी आधीच कोयनानगरच्या वनखात्याकडून इथे येण्याची परवानगी काढावी. कोयना वनखात्याच्या ऑफिसचा दुरध्वनी क्रमांक-(०2372) 284091,
            सध्याच्या माहितीनुसार आता या परिसरात प्रवेश पुर्णपणे बंद केला आहे.
जर परवानगी मिळाली तर किल्ल्याच्या अलीकडेच असणा-या नवजा गावातूनच एखादा वाटाडय़ा घेतल्यास या गडावर जाण्याचा मार्ग स्थानिक माणसामुळे निर्धोक होऊ शकतो. रस्त्यावर या गडाची वाट दर्शवणारा एकही फलक अस्तित्वात नाही. त्यामुळे पहिल्यांदाच येणारा दुर्गप्रेमीसुद्धा वाट हमखास चुकतोच. सध्या किल्ल्यावर पाणी नसल्यामुळे गावातूनच आपल्याकडील बाटल्या भरून घ्यायच्या व टॉवर कॉलनीमार्गे पंचधारा बोगद्याकडे चालू लागायचे. या रस्त्यावर ५०० मीटरवर एक चौकी आहे, ती ओलांडल्यावर साधारणपणे ५०० मीटरवर डाव्या हाताला एक कच्चा रस्ता डोंगरात गेलेला दिसतो. येथेपर्यंत खाजगी वहानाने जाता येते. येथून डोंगर चढण्यास सुरुवात करावी.वाट मळलेली असून गर्द झाडीतून जाते.
     स्थानिक वाटाडय़ा बरोबर घेऊन रस्त्यापासून साधारण तासाभराचं अंतर हे घनदाट जंगलातून पार करावं लागतं. जंगली जयगडावर जाण्यासाठी हा एकमेव मार्ग आहे, कोकणातून थेट कडा असल्याने त्याबाजुने गडावर जाता येत नाही. हा ट्रेक करताना गडावर रहाण्याची सोय नाही, तसेच कॅम्पिंगची परवानगी नाही हे लक्षात ठेवणे आवश्यक आहे. कोयनानगर गावात रहाण्याची सोय होईल किंवा नवजा गावतील शाळेत मुक्काम करता येईल. तसेच गडावर जेवणाची सोय नाही, कोयनानगर गावात हॉटेल्स आहेत .गडावर जातांना वाटेत असलेल्या झर्‍यात जानेवारी – फेब्रूवारी महिन्यापर्यंतच पाणी असते. नंतर नवजा गावातून पाणी घेउन जाणे योग्य. शक्यतो गडावर जाण्यासाठी नोव्हेंबर ते मे हा काळ उत्तम.
खरेतर घनदाट जंगलामुळे आपण वाट चढतोय याची जाणीवसुध्दा होत नाही.
फक्त थोडी माहिती आणि नजर असेल तर अस्वलाने नख्याने झाडावर काढलेली नक्षी, पायवाटेच्या बाजुला असणारे जनावरांच्या खुराच्या खुणा या सर्व जगंलाच्या जिवंतपणाची लक्षणे. आपण चालत असताना कदाचित अनेक डोळे सावधपणे आपल्याला न्याहाळताहेत याची जाणीव होते. पार्श्वभुमीला सतत पक्षांचा किलबिलाट एकू येत असतो, क्वचित कर्णकटू असे एखाद्या प्राण्याचे किंचाळणे एकु येते आणि अंगावर सर्ररकन काटा येतो. नशीबात असेल तर एखाद्या वन्यप्राण्याचे दर्शनसुध्दा होउ शकते. भर उन्हाळ्यात सूर्याचा किरणही जमिनीला स्पर्शू न देणारं हे जंगल म्हणजे या किल्ल्याची खरीखुरी संपत्ती आहे असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. खरेच ज्याने कोणी जंगली जयगड हे नाव ठेवले, ते अगदी यथार्थ आहे.
     पायवाट थोडय़ा वेळेतच सपाटीवर घेऊन आली. येथून सरळ डोंगर चढाईच्या वाटेने चढल्यानंतर आपण घोडेतळ या निसर्गरम्य ठिकाणी येऊन पोहोचतो. या ठिकाणी पाण्याचा एक जिवंत झरा असून, विश्रांतीसाठी वन विभागाने एक दगडी कट्टासुद्धा बांधलेला आहे. गड पाहून परत आल्यावर पोटपूजा उरकण्यासाठी हे ठिकाण उत्तम! इंग्रजांच्या काळात जंगली जयगडला येणारे अधिकारी या ठिकाणी आपली घोडी उभी करून पुढे पायी गडाकडे जात असत. त्यामुळे या ठिकाणास घोडेतळ म्हटले जाते. नीट निरखुन पाहिल्यास या पाणवठ्यावर येणार्‍या प्राण्यांचे ठसे आपणाला दिसू शकतात. नवजा गाव सोडल्यानंतर इथपर्यंत येण्यास साधारण दीड ते दोन तास लागतात. येथून आपण सरळ दाट जंगलातून जाणाऱ्या पायवाटेने चालू लागायचे. अध्र्या तासात मूळ पायवाटेला डावीकडे एक फाटा फुटतो. जंगली जयगडकडे जाणारी ही वाट सरळ डिचोली गावाकडे जाते. या डाव्या हाताच्या पायवाटेने निघालो की भोवतीचे जंगल घट्ट होते.सदाहरित प्रकारातील या जंगलात बांबूचे प्रमाण अधिक आहे. या शिवाय ऐन, अंजन, वेत, कुंभा, जांभूळ, आंबा अशी नाना प्रकारची वृक्षराजी येथे आहे. त्यामुळे पशू-पक्ष्यांचे अस्तित्व मोठे आहे. जंगलातून वर चढणाऱ्या पायवाटेने लता-वेलींचे अडथळे पार करत आपण दरी काठाच्या माथ्यावर येऊन पोहोचतो. दरीच्या या माथ्यावर छोटेखानी झेंडय़ाचा गोलाकार बुरूज असून, त्यावर चढण्यासाठी पायऱ्या बांधलेल्या आहेत. आपण जंगली जयगडसमीप आलो याची ही खूण. घोडेतळापासून इथपर्यंत येण्यास अर्धा तास लागतो. या दरीच्या माथ्यावरून खाली उतरणाऱ्या पायवाटेने पुढे गेल्यावर समोरच खोल दऱ्यांच्या मधोमध वसलेला जंगली जयगड दिसतो.
 हा गड सह्य़ाद्रीच्या मुख्य रांगेपासून सुटावलेल्या डोंगरावर उभा असून, त्याची एक चिंचोळी धार सह्य़ाद्रीशी जोडली गेली आहे.
 हा आकार पाहून लोहगडाच्या विंचुकाटा माचीची आठवण होते. येथेच गडाचे उध्वस्त प्रवेशव्दार आहे. झाडीत विखुरलेल्या घडीव दगडांवरून ते ओळखता येते.
 दाट झाडीतून खाली उतरणाऱ्या पायवाटेने उघडय़ा-बोडक्या गडाकडे नेणाऱ्या चिंचोळ्या धारेवर काळजीपूर्वक उतरायचे.
पुढे एक-दोन टेकडय़ांना बाजूला ठेवत गडाच्या मुख्य डोंगरासमोर आपण येऊन पोहोचतो.  
गडाच्या टोकाकडे जातांना आपल्याला दोन छोट्या कातळ सुळक्यांना वळसा घालून जावे लागते, या सुळक्यांना स्थानिक लोक "दिपमाळ" या नावाने ओळखतात. इथे जांभ्या दगडातील तटबंदीचे अवशेष पाहायला मिळतात. गडाचे प्रवेशद्वार भूकंपात ढासळलेले आहे. पुढे काही इमारतींच्या जोत्यांमधून आपण आत प्रवेश करतो. जयगडाच्या मुख्य सपाटीवर पोहोचताच किल्ल्याचा चिंचोळा आकार पटकन आपल्या नजरेत भरतो. तसेच किल्ल्याच्या तिन्ही बाजूंनी सरळ दरी असल्यामुळे जंगली जयगडाच्या निर्मात्यास याच्या रक्षणासाठी तटबंदी बांधण्याची फारशी गरज उरलेली नाही. इथेच एक दगडी चौथरा दिसतो.
तो पाहून पुढे जाताच भग्न मंदिर दिसते.
हे छोटेखानी मंदिर, त्याच्यासमोर भूकंपाचा धक्का पचवून ताठ मानेने उभी असलेली दगडी दीपमाळ व तेथे असणारे एक दगडी भांडे आदी दुर्गअवशेष गडाचे वातावरण जिवंत करतात.
 हे ठिकाण म्हणजे गडदेवता ठाणाईचे मूळ ठिकाण असून, सध्या मात्र येथील छोटी घुमटी मूर्तीविरहित आहे.
यापुढे पुन्हा एका उंच टप्प्यावर चढायचे. इथे चौकोनी दगडी बांधकाम असलेला एक बुरुज असून, त्याचा उपयोग इतिहासात टेहळणीसाठी होत असे. त्या चौथऱ्यासमोरच आपणास  किल्लेदाराच्या वाडय़ाचा चौथरा पाहायला मिळतो. वाडय़ाच्या मागे डाव्या हातास दरीच्या माथ्यावर मातीने भरलेली जांभ्या दगडातील एक बांधिव विहीर पूर्णपणे मातीने भरून गेलेली आहे.
ही विहीर पाहून आपण गडाच्या पिछाडीच्या पश्चिम टोकावर यायचे.
येथून खाली दरीत पोफळी लाईट हाऊस, समोर सर्ज वेल,
तर उजव्या हातास कोळकेवाडी जलाशय, त्याच्या काठावरचा अपरिचित कोळकेवाडी दुर्ग आणि या सर्व ठिकाणी पोहोचण्यासाठी केलेला नागमोडी पोफळी घाटही व्यवस्थित न्याहाळता येतो.
( सर्ज वेल अर्थात उल्लोळक विहीरीजवळून जंगली जयगडाचा मी घेतलेला फोटो )
सभोवार तळकोकणचे रम्य दृश्य दिसते. उत्तरेस नजर फेकताच वासोटा ऊर्फ व्याघ्रगड, महिमंडणगड व मकरंदगड तर त्याच्या डावीकडे रसाळ, सुमार व महिपत ही इतिहासप्रसिद्ध दुर्गत्रयी आपणास साद घालतात.
दक्षिणेला कुंभार्ली घाट आणि त्यातून ये-जा करणार्‍या वहानांचे स्पष्ट आवाज येत असतो. त्याच्यापलीकडे भैरवगड, तर तळात पार वशिष्ठीच्या काठावर निवांत पहुडलेले चिपळूण शहर आपले लक्ष वेधून घेते.खाली कोकणात उतरलेल्या सह्याद्रीच्या रांगा विलोभनीय दिसतात.
       कुंभार्ली घाटावर लक्ष ठेवण्यासाठी इतिहास काळात जंगली जयगडची निर्मिती करण्यात आली. शिवकाळात हा गड शिवाजी महाराजांच्या अमलाखाली होता.याच्या शेजारील हेळवाक हे गाव बाजारपेठ म्हणून प्रसिद्ध होते. त्यामुळे जंगली जयगडचा समावेश हेळवाक महालात होत असे. पुढे १७५८-५९ मध्ये पंतप्रतिनिधींकडील हा किल्ला पेशव्यांचे सरदार खंडोजी मानकर यांनी घेतला, पण पेशव्यांनी याचा ताबा परत पंतप्रतिनिधींकडे देण्यास सांगितले. पुढे १८१० मध्ये प्रतिनिधींची आश्रित ताई तेलीण हिच्या ताब्यातून पेशव्यांचा सेनापती बापू गोखले यांनी हा किल्ला जिंकून घेतला. शेवटी १८१८ च्या इंग्रज-मराठे युद्धात कर्नल हिवेट याच्या नेतृत्वाखालील फौजेने हा किल्ला जिंकून घेतला.
     असा हा किल्ला त्याच्या पर्यंत पोहोचेपर्यंत पार कराव्या लागणाऱ्या जंगलच्या तटबंदीमुळे जंगली जयगड हे नाव सार्थ करतो. प्रसिद्धीच्या फारसा झोतात नसलेला आणि संरक्षित जागेमुळे विस्मृतीत गेलेल्या या किल्ल्यास फारच कमी दुर्गयात्री भेट देतात. म्हणूनच या गडाकडे येणारी पावले ही अस्सल दुर्गवेडय़ांचीच असतात हे वेगळे सांगायला नको. माणसांच्या आणि सिमेंटच्या जंगलातून बाहेर पडून या अनोख्या जंगली जयगडाचा अनुभव हा अविस्मरणीय ठरतो.

क्षेत्र महाबळेश्वर :-

   जुन्या महाबळेश्वराला धोम महाबळेश्वर असेही जुन्या महाबळेश्वराची उंची ४३८५ फूट आहे. येथील डोंगरातून ७ प्रवाह बाहेर वाहात येतात. त्यांत शिवलिंगे आहेत. या सात प्रवाहांना कृष्णा, वेण्णा, कोयना, गायत्री, सावित्री, भागीरथी, सरस्वती अशी नांवे आहेत. या सर्व नद्यांचे पाणी एका कुंडांत एकत्र आले असून त्याला ब्रह्मकुंड असे नाव आहे. तेथून ते दुसर्या एका कुंडात सोडले आहे. पाण्यातील लिंगावर १४ हातांची एक ताम्र गजाननाची प्रतिमा आहे. या मंदिराला पंचगंगा मंदिर म्हणतात. येथे रुद्र, चक्र, हंस, पितृमुक्ति इ. तीर्थे आहेत. हे मंदिर इ. स. १२१५ यादव घराण्यांतील सिंघण देवाने बांधले. पुढे त्यांची दुरुस्ती वेळोवेळी शिवाजी महाराज, चंद्रराव मोरे, शाहू महाराज यांनी केली. शिवाजी महाराजांनी देवळास तीन सोन्याचे कळस दिले होते. अहिल्याबाईने केदारेश्वराचे मंदिार बांधले. बारा वर्षाच्या तीर्थयात्रेनंतर समर्थ येथेच प्रगट झाले. ते येथे दोन अडीच महिने होते. पहिला मारुती त्यांनी येथेच स्थापन केला. येथून समर्थ कृष्णेच्या काठाकाठाने वाई, माहुली करीत कर्हाडपर्यंत गेले.
येथे गोपाळभट महाबळेश्वरकर नावाचे एक सत्पुरुष राहात होते. शिवाजी महाराजांनी व त्यांच्या मातुश्रींनी त्यांच्याकउून गुरुपदेश घेतला होता. महाराजांनी त्यांना वर्षासन दिले होते. ते सूर्यापासक होते. ६-१-६५ ला येथे शिवाजी महााजांनी आपल्या मातुश्रींची व एकनिष्ठ वृध्द माननीय सल्लागार सोनोपंत डबरी यांची सूर्यग्रहणाच्या वेळी सुवर्ण तुला केली. किती सोने लागले त्याचा उल्लेख नाही.१६५७ अखेर दिवाकर गोसावी यांनी बहिरभटांमार्फत मंदिराची दुरुस्ती केली. सवाई माधवराव हा एकच पेशवराव १४-१०-१७९१ रोजी येथे आला होता. त्याच्या बरोबर मॅलेट व प्राईस हे दोघे इंग्रज होते.
   कृष्णामाई मंदिर :
   महाबळेश्वर येथील पंचगंगा उगम व महाबळेश्वर मंदिराला भेट देणाऱ्यांची संख्या भरपूर; पण या दोन देवळांया अगोदर बांधलेल्या मूळ कृष्णामाई मंदिराची ओळख करून घेऊ. कार पार्किंगच्या पूर्वेस साधारण पाच ते १० मिनिटांत चालत येथे पोहोचता येते. हे देऊळ फारसे परिचित नाही. अलीकडे आठ-दहा वर्षांत पुरातत्त्व विभागाने उत्खनन करून साफसफाई करून हे मंदिर उजेडात आणले आहे. हे देऊळ कोणी बांधले याची निश्चित माहिती नाही; पण साधारण ११व्या शतकातील किंवा त्यापूर्वीचे बांधकाम असावे. या मंदिराची शैली परिचित नाही. येथे स्मशानभूमी होती. त्यामुळे याकडे दुर्लक्ष झाले होते. आता येथून स्मशानभूमी हलविली आहे. या मंदिराच्या बाहेरील बाजूला विष्णू, तसेच गरुडध्वज दिसून येतात. वास्तविक विष्णूची प्रतिमा स्मशानाजवळ आढळत नाही. देऊळ वापरात नसल्यामुळे येथे स्मशान झाले असावे. आतील गोमुखातून पाणी पडत असते.समोरील नंदीच्या मूर्तीची शैली खूपच वेगळी आहे. त्याला कोणतेही अलंकार दिसत नाहीत. आतील बाजूस असलेले शिवलिंग एका चौकोनी स्तंभावर आहे. याच्या खालील बाजूस १०८ नाग दिसून येतात. मंदिराच्या गाभाऱ्यासमोरील भाग खुला आहे. साधारण १७ मार्च ते २३ मार्च व १७ सप्टेंबर ते २३ सप्टेंबर या कालावधीत येथे संपूर्ण गाभाऱ्यात सूर्यकिरणे पडतात. समोरच कृष्णा खोऱ्याचे दूरपर्यंतचे विंहंगम दृश्य दिसते. मंदिराची शिखरबांधणी पावसाचा मारा लक्षात घेऊन करण्यात आली आहे. लांबून मंदिराची कल्पनाही येत नाही. कृष्णा नदी येथूनच आपला प्रवास सुरू करते.
  पंचगंगा मंदिर : 
     महाबळेश्वरमधील पवित्र स्थानांपैकी एक पंचगंगा मंदिर आहे. सुमारे ६०० वर्षापूर्वीचे असलेले हे मंदिर पाच नद्यांचे उगमस्थान असून या मंदिरातून कृष्णा, कोयना, सावित्री, गायत्री व वेण्णा या नद्यांचा उगम झाला आहे. श्रावण महिन्यात व महाशिवरात्रीस लाखो भाविक क्षेत्र महाबळेश्वरला भेट देतात. पंचगंगेचे मंदिर १७व्या शतकात बांधण्यात आले या ठिकाणी पाच नद्यांच्या मूळधारा उगम पावतात. कृष्णेच्या मूर्तीजवळ दर बारा वर्षांनी भागीरथी कृष्णेस भेटावयास येते तर दर साठ वर्षांनी कपिलाष्टीच्या योगावर सरस्वती नदी गायत्रीस भेटावयास येते.आता ती २०३४मध्ये दिसेल, तर भागीरथी १२ वर्षांनी श्रावण महिन्यात येते. ती आता २०२८मध्ये प्रकट होईल. कृष्णा, कोयना आणि वेण्णा पूर्ववाहिनी नद्या आहेत. सरस्वती पश्चिमवाहिनी आहे. या नद्यांचे एकत्रित मंदिर बांधलेले आहे. यापैकी पहिल्या पाच नद्यांचा ओहोळ सतत बाराही महिने वाहत असतो.
क्षेत्र महाबळेश्वर
 हे पाच नद्यांचे प्रवाह कलाकृतीतून उगम स्थानांना एकत्र करुन ते पाणी गोमुखातून कुंडात सोडलेले आहे त्यास ब्रहकुंड म्हणतात, शेजारी विष्णू कुंड ही आहे.
   पंचगंगेच्या मंदिराबाहेर अहिल्याबाई होळकर यांनी बांधलेले रुद्रेश्वर व रुद्र्तीर्थ मंदिर भग्नावस्थेत आहेत. पंचगंगा व महाबळेश्वर मंदिरादरम्यान अतिबलेश्वर मंदिर आहे त्यासमोर हंसतीर्थ होते असे सांगतात.
महाबळेश्वरचे निसर्ग सौंदर्य पहाण्यास तर सर्वजण येतात पण तेथील पौराणिक आणि ऐतिहासिक महत्व असलेल्या क्षेत्र महाबळेश्वरला आपण जरूर भेट द्यायला हवी.
   महाबळेश्वर पासून ५ किमी अंतरावर क्षेत्र महाबळेश्वर आहे. या ठिकाणी अनेक धार्मिक स्थळे आहेत. क्षेत्र महाबळेश्वर येथे अतिबळेश्वर व महाबळेश्वर ही दोन मोठी शिवमंदिरे बांधलेली आहेत. तसेच येथे असलेल्या पंचगंगा मंदिरालाही ऐतिहासिक वारसा लाभलेला आहे.मंदिराच्या शेजारी छोटा बाजार आहे. येथे पार्किग 20 रुपये आहे.
महाबळेश्वर मंदिर :
महाबळेश्वर या मंदिराच्या नावामुळेच या ठिकाणाला महाबळेश्वर हे नाव पडलं असावं. येथील महाबळेश्वराचे मंदिर हे यादव राजा सिंघनदेव याने तेराव्या शतकात बांधले. महाबळेश्वर मंदिरातील शिवलिंग स्वयंभूखडकातून असून रुद्राक्षकृती खाचखळग्यातून सतत पाणी वाहत असते. शिवलिंग असला तरी या ठिकाणी पिंडी नाही. या मंदिरामध्ये शंकराच्या पिंडीबरोबरच सुमारे तीनशे वर्षापासून भगवान शंकराची शेज, डमरू आणि त्रिशुळ देखील ठेवले आहे. असं मानले जातं की, भगवान शंकर येथे रात्रीस निद्रा घेतात आणि रोज सकाळी त्यांच्या शेज विस्कटलेल्या अवस्थेत असते. येथील मंदिरात छत्रपती शिवाजी महाराजांनी राजमाता जिजाऊ साहेब व सोनोपंत डबीर यांची सुवर्णतुला केली. या मंदिरापासून समर्थ स्थापीत मारूती व मठ जवळच आहे. अफझलखानच्या तंबूवरील कापून आणलेले सोन्याचे कळस शिवाजी महाराजांनी या महाबळेश्वर मंदिरास अर्पण केले होते. येथे महाशिवरात्रीला मोठी यात्रा भरते.


पसरणी गावचा शेख मीरा यांचा वाडा :-

       वाई सह्याद्रीच्या कुशीत घनदाट वनराईत अनेक छोटी-छोटी गावं वसली आहेत. पूर्वी डोंगररांगांच्या पायथ्याला असलेल्या जंगलात मोकळ्या जागेत शेती करून लोक शेताजवळ वस्ती करून राहू लागले. जागा मिळेल तिथे चार-दोन घरांची वस्ती निर्माण झाली. पसरून पसरून असणाऱ्या लोकवस्तीमुळं ‘पसरणी’ गावाची निर्मिती झाली. लोकवस्तीच्या आजूबाजूला असलेल्या जंगलात गायरानं होती. गुराखी गुरं चरायला नेत. दगडी बारवातलं पाणी पिऊन जनावरं वनराईत विश्रांतीसाठी पसरत. यावरूनही लोकवस्तीला ‘पसरणी’ नाव पडले, अशी आख्यायिका सांगितली जाते. शिवरायांच्या पराक्रमाची साक्ष देणारा हा परिसर. वाईहून पांचगणी-महाबळेश्वरला जाताना सह्याद्रीच्या डोंगररांगेत नागमोडी वळणाच्या घाटाला ‘पसरणी घाट’ असे नाव आहे. डोंगराच्या पायथ्याला व कृष्णा नदीच्या तीरावर येथील बहुसंख्य शेतकरी आपल्या शेतात वस्ती करून राहिल्याने व ही वस्ती पसरून असल्याने गावचे नाव पसरणी पडले आहे.
       गावाच्या अलिकडे एक किलोमीटर अंतरावर एका ऐतिहासिक वाड्याच्या खुणा पाहण्यास मिळतात. तो शेख मीरा यांचा वाडा. संभाजीराजांचे पुत्र शाहुराजे हे औरंगजेब बादशहाच्या कैदेतून १७०७ मध्ये सुटले. त्यांनी परतीच्या प्रवासात नर्मदा नदी ओलांडल्यावर लगेच मराठा सरदारांना पत्रे पाठवून स्वत:कडे आकृष्ट केले. ‘तुम्ही स्वामींचे पुरातन सेवक, या प्रसंगी स्वामींचे दर्शनास येऊन सेवा करावी, स्वामी तुमचे अर्जीत विशेष प्रकारे करतील. पुढे कूच दरकूच येत आहोत,’ असे पत्रात म्हटले होते. त्यांचा आणि ताराराणींचा संघर्ष झाला. खेड येथे लढाई होऊन शाहूराजांचा विजय झाला. ते पुणे, सुपे, शिरवळ, रोहिडा, राजगड, प्रचंडगड, चंदनवंदन ही ठिकाणे ताब्यात घेऊन साताऱ्यास आले. साताऱ्याच्या अजिंक्‍यतारा किल्ल्यावर परशुरामपंत प्रतिनिधी होते. शाहूराजांनी त्यांना शरण येण्यासंबंधी निरोप दिला. मात्र ते शरण येण्यास तयार नव्हते.
      शाहुराजांच्या सैन्याने अजिंक्यतारा किल्ल्याला वेढा नोव्हेंबर १७०७ मध्ये घातला. त्या वेळी शेख मीरा किल्ल्याचा हवालदार होता. त्याचा कुटुंबकबिला पसरणी येथील वाड्यात होता. शाहुराजांच्या सैन्याने त्यांना पकडून साताऱ्यात आणले. शाहूराजांनी शेख मीरास आठ दिवसांत किल्ला ताब्यात दिला नाही तर त्या सर्वांना तोफेच्या तोंडी देऊ असे कळवले. शेख मीरा घाबरला. त्याने परशुरामपंतांची भेट घेतली. मात्र पंतप्रतिनिधींनी त्याच्याकडे दुर्लक्ष केले. त्यांनी त्यास ‘तुझी नुकसान भरपाई करून दिली जाईल, काळजी करू नकोस’ असे सांगितले. तेव्हा शेख मीराने प्रतिनिधीसच कैद केले आणि साताऱ्याच्या किल्ल्याचा दिंडी दरवाजा शाहुराजांना मोकळा करून दिला. अशा त-हेने ताराराणीची सातारा ही राजधानी शाहूराजांच्या ताब्यात डिसेंबर १७०७ मध्ये गेली. शाहुराजांचा संकल्प आठ दिवसांत किल्ला ताब्यात घेण्याचा होता, तो पूर्ण झाला. तो दिवस शनिवारचा होता. तेव्हापासून शनिवारी ‘फत्तेची नौबत’ वाजवण्याची प्रथा पडली.
    त्यानंतर शेख मीरा शाहूराजांच्या सैन्यात अखेरपर्यंत असल्याचे दिसते. मराठे अकरा-बारा हजार सैन्य घेऊन दिल्लीत नोव्हेंबर १७१८-१७१९ मध्ये गेले. त्या सैन्यात अंबाजीपंत पुरंदरे, खंडेराव दाभाडे, संताजी, राणोजी घोरपडे, सटवाजी जाधव, कृष्णाजी जाधव, कृष्णाजी दाभाडे, तुकोजी पवार, शंकराजी मल्हार, मोहकमसिंग, नारो गंगाधर, बाळाजी फडणीस, नारो शंकर, चिमणाजी दामोदर, आवजी नीळकंठ, महादेव हिंगणे आणि शेख मीरा हे सरदार होते. शाहूराजांनी जंजिऱ्याचा सिद्दीसात यावर केलेल्या मोहिमेसाठी उदाजी पवार, देवराम, मेघश्याम, हरी मोरेश्वर, राजाज्ञ आणि शेख मीरा यांना आज्ञा केली होती.
    महाबळेश्वरला जाताना पाचगणी घाटातून आजही आपणास पसरणी गाव व शेख मीराचा वाडा दिसतो. शेख मीराचा वाडा पसरणी येथील कोराळा ओढ्याच्या जवळ उभा आहे. तो वाडा शेख मीराच्या तत्कालीन सरदारी थाटाची साक्ष देतो. तो वाडा सहा एकरांच्या परिसरात पसरला असल्याचे त्याची उभी असलेली तटबंदी सांगते. वाड्याचे प्रवेशद्वार त्याच्या भव्यतेची ग्वाही देते. प्रवेशद्वारातून आत गेल्यावर समोरच चार मोठ्या कमानी असलेली इमारत नजरेत भरते. बाहेरचे दालन खुले असून, त्याला जोडूनच चार-पाच खोल्या आहेत. एका खोलीत शेकोटीची कमान आहे. त्यावर चुन्यात बांधलेले धुरांडे आहे. एक खोली नमाजाची आहे. मुख्य दालनातून खोल्यांमध्ये प्रवेश करण्यास जिना आहे. मागच्या बाजूस कमानी असलेले दालन आहे. वाड्यास जोडूनच एक उंच टेहळणी बुरूज (मनोरा) उभा असल्याचे दिसते. एका बाजूस घोड्याची पागा असून, जवळच मोटेची घट्ट बांधणीची विहीर आहे.
     ब्रिटिश आमदनीत त्या वाड्यात वैभव नांदत होते. नोकर-चाकर यांची वर्दळ होती. शेख मीरा याला पसरणीचे नवाब म्हणून ओळखले जात असे. सध्या त्या वाड्यास नवाब बंगला असे म्हटले जाते. तेथून जाणारा एक कच्चा रस्ता आहे. तो पाचगणीला जातो. तो नवाबाच्या खासगी मालकीचा होता. त्याच्या परवानगीशिवाय त्या रस्त्याने जाता येत नसे अशी आठवण सांगितली जाते.
धोम धरण झाल्यावर त्या भागातील आजगावच्या काही विस्थापित लोकांनी तो वाडा खरेदी केला होता, त्यातील काही मंडळी तेथे वास्तव्य करून आहेत.
पसरणी गावात रघुनाथस्वामी नावाच्या संतांची समाधी असून, तेथे राममंदिर आहे. कालभैरवनाथ हे गावाचे मुख्य दैवत आहे. त्याचे मंदिर हेमाडपंथी आहे.
शेख मीरा यास बरीच गावे इनाम म्हणून मिळाली होती. पाचगणी येथील मालमत्ता त्याच्या उत्तराधिकाऱ्यारकडे होती. शेख मीराचा वंशज सैदुद्दीन हैदर विजली खान हा पाचगणी येथील जमीन खरेदी-विक्रीच्या गैरव्यवहारामुळे दिल्ली येथे कैदेत आहे असे समजते.
    येथील यात्रेसाठी राज्यभरातून भाविक येतात.येथील महादेवाचे मंदिर प्रसिद्ध आहे. याठिकाणी कृष्णा नदीचे पात्र दक्षिणेकडे वाहते. गावात जुन्या काळातील बारव आहे. या गावी शाहीर साबळे, क्रांतिवीर नाना पाटील, कर्मवीर भाऊराव पाटील, साने गुरुजी, सेनापती बापट यांच्या उपस्थितीत अस्पृश्यांना मंदिरात प्रवेश देण्यात आला. दसऱ्याला भैरवनाथाची पालखी निघते. यावेळी लाठीकाठी, दांडपट्टा, तलवारबाजी असे साहसी खेळ खेळले जातात.
       कीर्तिवंतांचं गाव :-
        पसरणी गावात महराष्ट्र शाहीर कृष्णराव साबळे, प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक बी. जी. शिर्के, बँकिंग क्षेत्रातील अर्थतज्ज्ञ गजानन दाहोत्रे, साहित्यिक, स्वातंत्र्यसेनानी जन्माला आले. त्यांनी गावची कीर्ती सर्वदूर पोहोचविली आहे. गावचे सुपुत्र पद्मश्री बी.जी. शिर्के यांनी उद्योगपती म्हणून देशात आणि देशाबाहेर मोठी कीर्ती संपादली. त्यांनी गावात माध्यमिक विद्यालयाची इमारत बांधली असून, गावाच्या मंदिराचा जीर्णोद्धारही केला आहे. त्यांनी गावासाठी अनेक सार्वजनिक कामे केली. त्यांना गावात मानाचे स्थान आहे.
     शाहीर साबळे पसरणी गावचे. त्या गावातील शिवाजीराव तथा मामासाहेब शिर्के यांनी दशकाहून अधिक काळ ‘पवनेचा प्रवाह’ हे साप्ताहिक चालवले आहे. त्या गावाचे रहिवासी न्यायमूर्ती पानसे हे हायकोर्ट जज्ज म्हणून सेवानिवृत्त झाले आहेत.
        शाहीर साबळे, बांधकाम व्यावसायिक बी. जी. शिर्के यांना पद्मश्री पुरस्काराने सन्मानित केले आहे. त्यामुळे अलीकडच्या काळात ‘पद्मश्रीं’चे गाव म्हणूनही पसरणीची ओळख निर्माण झाली आहे.पसरणीच्या चामडी बुटांची ब्रिटिशांना भुरळ. पसरणीची रेशमी ‘साळवी लुगडी’ प्रसिद्ध होती. इंग्रज राजवटीत गव्हर्नर साहेबांना येथील चर्मकारांनी बनविलेल्या बुटांनी भुरळ पाडलेली. म्हणून ते येथील चामडी बूट इंग्लंडला घेऊन जायचे. आजही महाबळेश्वरमध्ये काही चर्मकार बांधव कातडी चपला, बूट बनविण्याचा व्यवसाय करतात.

राजपुरी लेणी :-

   पाचगणी या गिरिस्थानाच्या सभोवार विखुरलेली पांडवकालीन, शिवकालीन स्थळे पर्यटकांना खुणावतात. राजपुरीच्या लेण्या ( ज्याला स्थानिक पांडवकालीन गुहा म्हणतात ) या परिसराचा इतिहास सांगतात. कार्तिकस्वामीच्या गुहा म्हणून या प्रसिद्ध आहेत. या पुरातन शैव गुंफा आहेत. येथे एकूण सात गुंफा आहेत. त्यापैकी चार पूर्ण व तीन अर्धवट आहेत. तेथे पाण्याची कुंडे आहेत. प्रत्येक गुंफेतून झोपून दुसऱ्या गुंफेत जाता येईल अशी व्यवस्था आहे. गुंफांमध्ये काही भित्तिशिल्पे पूजेसाठी ठेवलेली दिसतात. पावसाळ्यात पाझरून येणारे पाणी गुंफेच्या तोंडावर पडत असते.  स्थानिक ग्रामपंचायतीने एकदम व्यवस्थित बांधकाम केलेल्या दगडी पायऱ्या आपल्याला लेण्याकडे घेउन जातात.
    वरून पडणाऱ्या पाण्यामुळे व टपकत असलेल्या पहाडी झऱ्यामुळे सर्व जागा एकदम निसरडी झालेली आहे. तुम्ही एक ५०-६० पायऱ्या उतरलात की तुम्हाला समोर अप्रतिम सृष्टी-सौंदर्य नजरेस पडते ते खाली दरी कडे पाहताना. ह्या गुंफाबद्दल माहिती देणारा एखादा ही फलक तेथे नाही आहे ना गावातील लोकांना ह्या बद्दल काही माहिती. कुठल्याश्यातरी साधूने ह्यावर कब्जा करून ठेवला होता ते निर्वाण प्राप्त झाले आता तेथे गावातील एक पुजारी सोडला तर कोणी येत जात नाही. खाली उतरल्यावर उजवीकडे गुंफा आहेत ऐकून सात गुंफा आहेत चार पूर्णं गुंफा तीन अर्धवट पूर्णं. तेथे तीन पाण्याचे कुंड आहेत, गुंफा मानव निर्मित आहेत व पुरातन आहेत ह्या बद्दल काही शंकाच नाही. प्रत्येक गुफेतून दुसऱ्या गुंफेत झोपून प्रवेश करता येईल अशी निमुळता खंदक वजा रस्ता आहे. शेवटची जी गुंफा आहे ती सर्वात मोठी असून त्यात पाण्याचे दोन कुंड आहेत तसेच गोमुख व विष्णू मंदिर देखील आहे. हे मंदिर इत्यादी आताच म्हणजे मागील शतकामध्ये अस्तित्वात आले असावे. पाण्याचे झरे, पुरातन काळातील मंदिराच्या स्तंभाचे, गोपुरांचे अवशेष इकडे तिकडे अस्तावस्त पडलेले आहेत. गुंफामध्ये काही भिंती शिल्पे पुजेसाठी ठेवलेली आहेत, त्याना निरखून पाहताना लक्ष्यात येते की ते भिंती शिल्पे खूप जूनी असून व्यवस्थित निगा न राखल्या गेल्यामुळे नष्ट होण्याच्या मार्गावर आहेत. गुंफाच्या बाहेर एका छोट्या पुरातन मंडपामध्ये नंदी ची तीन फुट उंच मुर्ती आहे, गुंफामधील भींती शिल्पे व बाहेर असलेली भींती शिल्पे, नंदीची मुर्ती ह्या एकाच प्रकारच्या खडकातून निर्माण केलेले आहेत. बाकीच्या लेण्यात लक्षवेधी काही नसले तरी शैलगॄहात दहाव्या किंवा अकराव्या शतकातील सोमनाथदेवाचा मराठी देवनागरी लिपीतील शिलालेख आहे.हा शिलालेख प्रजापती सवंत्सरातील असला तरी संवत्सर व शक याचा उल्लेख नाही.त्यात राजवंशाचाही उल्लेख नाही.या शिलालेखात श्रीपतीनायक्,ददनायक ( श्रीपतीनायकाचा पिता ) विनायक आणि इदोप्य नामक व्यक्तिनामांचा आणि वणगृह ( राजपुरी गावाच्या उत्तरेला असलेल्या चार्,पाच कि.मी.वरच्या वणघर गावाचा ) व बावधन ( वाईच्या दक्षिणेला पाच कि.मी. असलेल्या गावाचा ) या गावांच्या नावाचा उल्लेख आहे.लेखात राजपुरी येथील सोमनाथच्या देवळाचा इतिहासही आलेला आहे.या दैवताचा प्रथम अवतार जलसंपात ( किंवा जलसंपत्ती ) देवाने जेव्हा सोमभुविनीस ( सोमनाथ ) उपदेश केला तेव्हा झाला होता. पुढे सोमनाथास श्रीपती नायकाच्या वंशातील कोणा विनायकाने उंच नेले व त्याच्याच वंशातील कोण्या इदोप्य नामक व्यक्तीने सोमनाथाचे देउळ बांधले.सध्या मात्र राजपुरीच्या लेणीपेक्षा इथे असलेली कार्तिकस्वामीची मुर्ती हे भाविकांचे खरे आकर्षण आहे.कार्तिक पौर्णिमेला इथे भाविकांची थोडीफार गर्दी होते.एरवी इथे कोणी फार फिरकत नाहीत.मात्र हि मुर्ती बरीच अलिकडची असावी.
    गुंफा पांडवकालीन असाव्यात असा एक कयास असे मानतात.अर्थातच त्यात तथ्य नाही.इथे विष्णु मुर्ती व इतर कातळकोरीव शिल्प दिसतात.तिन्ही कुंडातील पाणी एकदम स्वच्छ आहे व पिण्यात अतीशय मधूर. वरील डोंगरातून पाझरत पाझरत आलेले पाणी देखील गुंफाच्या समोर पडत असते व गुंफाच्या समोर एक नैसर्गिंक पाण्याचा अस्पष्टसा पडदा निर्माण होतो हे दृष्य पाहण्या योग्य आहे. समोर दरी मध्ये प्रचंड झाडी आहे व पक्ष्यांच्या अनेक प्रजाती तेथे पाहवयास मिळतात जाण्यासाठी हा डिसेंबर-जानेवारी महिना योग्य आहे . अंतर – पाचगणीपासून ६.७ किलोमीटर अंतरावर.
कसे जाल, कोठे राहाल महाबळेश्वर, पाचगणीला?
महाबळेश्वर व पाचगणीला मुंबईहून महाड, पोलादपूरमार्गे, तसेच पुण्याहून वाईमार्गे जाता येते. तसेच कोल्हापूरकडून सातारा, मेढामार्गे जाता येते. जवळचे रेल्वे स्टेशन सातारा व वाठार - ६० किलोमीटर. जवळचा विमानतळ पुणे - १३० किलोमीटर. जास्त पावसाचा जुलै महिना सोडून येथे जाता येते. दोन्ही ठिकाणी राहण्यासाठी मध्यम आणि उत्तम दर्जाची हॉटेल्स आहेत.
 सातारकर छत्रपतींच्या वास्तव्यामुळे सातारा शहर आणि परिसराला ऐतिहासिक वारसा लाभलेला आहे. त्यासंदर्भातील अनेक ऐतिहासिक स्थळे सातारा आणि परिसरामध्ये विखुरलेली दिसतात. सातारा परिसराचे वैशिष्टय़ म्हणजे पश्चिमेचा प्रदेश हा सह्य़ाद्रीच्या निकट सान्निध्याचा, भरपूर पावसाचा आणि याच सातारा जिल्ह्य़ाच्या पूर्वेचा प्रदेश पर्जन्यछायेमधला, दुष्काळी. कृष्णा, कोयना अशा नद्यांचा हा प्रदेश, पण या नद्यांपासून अंतर असलेल्या प्रदेशात आजही पाण्यासाठीची वणवण चालूच आहे. महाबळेश्वरसारखे उत्तुंग गिरिशिखर लाभलेला हा प्रदेश. शिवरायांच्या पदस्पर्शाने पुनीत झालेला हा प्रदेश. अनेक ऐतिहासिक घटनांचा साक्षीदार असलेला हा प्रदेश. वाई, मेणवली, धोम ही तीर्थक्षेत्रे याच प्रदेशात आहेत, तसेच निरनिराळी मंदिरे, देवस्थाने, किल्ले यांनीसुद्धा हा प्रदेश संपन्न आहे. सध्याच्या विकासाच्या युगात पवनचक्क्यांचा प्रदेश अशीसुद्धा आता ओळख सांगता येईल इतक्या पवनचक्क्या सातारा आणि आसपासच्या डोंगरांवर दिमाखात फिरताना दिसतात. कोकणात जाणारे अनेक प्राचीन घाटमार्ग सातारा परिसरातून खाली उतरतात. प्रतापगड, अजिंक्यतारा, वासोटा, मकरंदगडसारखे बेलाग किल्लेसुद्धा याच प्रदेशात पाहायला मिळतात.

कोयनानगरजवळचा भैरवगड  

महाराष्ट्राचा भौगोलिक विचार केला तर सपाट असणारा देश आणि समुद्रसपाटीला असणारे कोकण यांच्या मधोमध एखाद्या द्वारपालासारखा सह्याद्री खडा आहे. उंच सुळके, बेलाग शिखरे, अडचणीच्या खिंडी, नाळेच्या वाटा आणि जणु बोट धरुन उतरायला लावणारे घाट वाटा इथे आहेत. यावर नजर ठेवायला सह्याद्रीच्या मुख्य रांगेत अनेक गड, किल्ले फार प्राचीन काळापासून उभारले आहेत. अश्यापैकी एक गर्द जंगलाने वेढलेला वनदुर्ग म्हणजे कोयनेजवळचा "भैरवगड". महाराष्ट्रात चार भैरवगड आहेत, त्यापैकी कोयनेच्या म्हणजेच सध्याच्या सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात , सह्याद्रीच्या मुख्य रांगेपासून थोडा पुढे कोकणात झुकलेला हा गड तसा दुर्लक्षित आहे. या परिसराचे मुख्य संरक्षण म्हणजे दिवसाही सुर्यप्रकाश जमीनीवर पडू न देणारे गर्द जंगल. यातच वासोटा, प्रचितगड यासारख्या महत्वाच्या किल्ल्यामधे पालीचा किल्ला, जुंगटीचा किल्ला, जंगली जयगड आणि भैरवगड अशी दुर्गसाखळी या परिसरात आहे. पैकी पालीचा किल्ला आणि जुंगटीचा किल्ला या परिसरात आता कोणालाही सोडले जात नाही, त्यामुळे तिथे आता मानवी वावर नाही. आत्ताच जंगली जयगडाचा राबताही बंद केला आहे. तेव्हा रहात राहिला भैरवगड. आज आपण तिथेच जाणार आहोत.
      भैरवगड हा कोयनानगर विभागात मोडणारा किल्ला आहे. येथील किल्ल्यांचे वैशिष्ट्य म्हणजे सर्व किल्ले घाटमाथ्याच्या (सह्याद्रीच्या) सलग रांगेपासून बाहेर आलेल्या डोंगराच्या फाट्यावर वसलेले आहेत. त्यामुळे दुरून हे किल्ले दिसत नाहीत. घनदाट जंगल हे येथील मुख्य आकर्षण आहे. हे अरण्य अभयारण्य म्हणून घोषित करण्यात आल्याने येथील सर्व गावांचे स्थलांतर करून ती अरण्याबाहेर वसवण्यात आली आहेत. त्यामुळे या भागात माणसांचा वावर तसा कमीच आहे. २०१२ साली भैरवगडाच्या आजूबाजूचे अभयारण्य "टायगर रिझर्व" घोषित केल्यामुळे हेळवाकहून भैरवगड, पाथरपुंज (व प्रचितगड) कडे जाणार्‍या कच्च्या रस्त्यावर जंगल खात्याने चौकी बसवलेली आहे व वनखात्याची लिखित स्वरूपातील पूर्वपरवानगी घेतल्याशिवाय या रस्त्याने जाता येत नाही.मुळात भैरवगड आणि आसपासची गावे हा सर्व भाग कोयनाप्रकल्प आणि वनखात्याअंतर्गत संरक्षित करण्यात आलेला आहे. त्यामुळे येथे पर्यटकांना मुक्तपणे फिरता येत नाही. यासाठी आधीच कोयनानगरच्या वनखात्याकडून इथे येण्याची परवानगी काढावी. कोयना वनखात्याच्या ऑफिसचा दुरध्वनी क्रमांक-(०2372) 284091, तरीही अभयारण्य क्षेत्रात चोरून प्रवेश केल्यास रुपये ५०,०००/- दंड / ३ वर्षाची सजा होऊ शकते.
       भैरवगडावर जाण्यासाठी ६ वाटा आहेत.
१) हेळवाकची रामघळ मार्गे :-
हेळवाकच्या रामघळीत जाण्यासाठी चिपळूण किंवा कराड गाठावे. चिपळूण कराड रस्त्यावर कुभांर्ली घाट पार केल्यावर, कोयनानगरच्या अलिकडे 5 ते 6 कि.मी वर हेळवाक गाव आहे. तिथे ऊतरुन मेंढेघरमार्गे कोंढावळे धनगरवाड्याला जावे. येथून डोंगर उजवीकडे व ओढा डावीकडे ठेवून १ तासांत रामदास स्वामींच्या वास्तव्याने पावन झालेली "रामघळ" गाठावी. याच रामघळीत रामदास स्वामींना "आनंदवन भुवनी " हे काव्य सुचले अशी दंतकथा आहे.. ही रामघळ पाहून , रामघळीतूनच वर जाणारा रस्ता पकडावा. पाथरपुंज जुना वाघोना मार्गावरून आपण भैरवगडावर जाऊ शकतो. मात्र हा पल्ला फारच लांबचा असल्याने गड गाठण्यास ६ तास लागतात. वाटेत खूप घनदाट जंगल लागते. वाट तशी मळलेली नसल्याने हरवण्याचा संभव खूपच आहे. या वाटेने जायचे असल्यास वाटाडया घेऊन जाणे आवश्यक आहे.
         वनखात्याची लिखित स्वरूपातील पूर्वपरवानगी घेतल्यास पावसाळा सोडून इतर ऋतुत जीपने, कच्च्या रस्त्यावरुन हेळवाक मार्गे भैरवगडापर्यंत जाता येते. (हेळवाक ते भैरवगड अंतर साधारणपणे २० किमी आहे.) सध्या भैरवगडावर किंवा जवळच्या भैरवनाथ मंदिरात मुक्काम करण्याची परवानगी नाही, त्यामुळे हा पर्याय बाद झाला असे म्हणले तरी चालेल. या रस्त्याने जायचे झाले तर चाफ्याचा खडक या धनगरवाड्यातील वाटाडे वाट दाखविण्यासाठी अडवून मोठी रक्कम मागतात असा अनुभव आहे.
२) दुर्गवाडी मार्गे :-
या मार्गे भैरवगडावर येण्यासाठी प्रथम चिपळूण गाठावे. चिपळूण वरून डेरवण मार्गे दुर्गवाडी हे पायथ्याचे गाव गाठावे. चिपळूण ते दुर्गवाडी अशी ८:०० वाजताची बस आहे. दुर्गवाडी पर्यंत येण्यास साधारणत: १ तास लागतो. दुर्गवाडी गावाच्या वर असणार्‍या जंगलातून वाट थेट गडावर जाते. या वाटेने गड गाठण्यास ३ तास लागतात. वाट तशी सरळच असली तरी दमछाक करणारी आहे. गव्हारे - गोवळ पाती गावातून येणारी वाटसुद्धा या वाटेलाच येऊन मिळते. वाटेत कुठेही पाणी नाही. पायथ्यापासून भैरवगडावर पोहोचण्यास ३.३० तास लागतात.
दुर्गवाडीमार्गे भैरवगडाला जावयाचे झाल्यास एस्.टी. बसचे वेळापत्रक खालील प्रमाणे आहे-चिपळूणवरुन पहाटे ४.००, ७.५०,११.००, २.१५, ४.४५ ( मुक्कामी) तर दुर्गवाडीवरुन ७.३०,८.००,९.३० आणि संध्याकाळी ४.०० अशी बसची सोय आहे.
          ३) गोवळ पाती मार्गे :-
मुंबई - गोवा महामार्गावर चिपळूण पासून गोव्याच्या दिशेला जातांना "आसूर्डे फाटा" २१ किमीवर आहे. तिथून डावीकडील रस्ता २२ किमीवरील गोवळ पाती गावापर्यंत जातो.(यातील शेवटचे ५ किमी कच्चा रस्ता आहे.) गोवळ पाती गावातून गडावर जाण्यासाठी गावकर्‍यांनी पायर्‍या बांधलेल्य़ा आहेत. गावाच्या वर असलेल्या पठारापर्यंत या पायर्‍यांनी जाता येते.(येथे येण्यासाठी गावातून १.३० तास लागतो). पुढे खड्या चढणीच्या वाटेने २ तासात आपण भैरवगडावरील मंदिरात पोहोचतो. पायथ्यापासून भैरवगडावर पोहोचण्यास ३.३० तास लागतात.
४) गव्हारे मार्गे :-
गडावर जाण्यासाठी गव्हारे (गोवारे) गावातूनही वाट आहे. हेळवाक किंवा संगमनगर पुलमार्गे गव्हारे (गोवारे) गावाकडे जाणारा गाडीरस्ता लागतो. या गाडीरस्त्याने गव्हारे गावात पोहचावे. गावातून गडावर जाण्यास तीन तास पुरतात. ही वाट मध्येच दुर्गवाडी गावातून येणार्‍या वाटेस मिळते. पावसाळा सोडून इतर ऋतुत जीपने, कच्च्या रस्त्यावरुन कोयनानगर - गव्हारे (गोवारे) - पाथरपुंज मार्गे भैरवमंदिरा पर्यंत जाता येते. तेथून भैरवगडापर्यंत जाण्यासाठी अर्धा तास लागतो. पायथ्यापासून भैरवगडावर पोहोचण्यास ३.३० तास लागतात.
५ ) कोयनानगरच्या अलिकडे संगमनगर ( धक्का ) नावाचा कोयना नदीवर पुल आहे, तो ओलांडून चिरंबे-नाव-कोळणे मार्गे पाथरपुंज गाव गाठता येते. वाटेत एका ठिकाणी वनखात्याचे कंपाउंड लागते. हा कच्चा जीप रस्ता आहे. पाथरपुंज गावातून असाच कच्चा जीप जाण्याजोगा रस्ता थेट भैरवगडाजवळच्या भैरवनाथ मंदिरापर्यंत जातो.
 ६) या परिसरात उभ्या रहात असलेल्या पवनचक्क्यामुळे पाटण- मोरगिरी- धावडे-गोकुळ- गोठणे-मळे-पाथरपुंज असा ट्रक जाण्यायोग्य कच्चा रस्ता आहे. यामार्गेही स्वताची मोटारसायकल किंवा जीप यासारखे वाहन असेल तर येणे शक्य आहे. सकाळी लवकर पाटणपासून किंवा कोयनानगरवरुन सुरवात केल्यास एका दिवसात भैरवगड पाहु शकतो.
       भैरवगड कोणत्याही ऋतुत जाण्यायोग्य असला तरी तेथे जाण्याचा रस्ता सध्या वनखात्याच्या हद्दीत येत असल्याने पावसाळ्यात जाण्यास परवानगी मिळत नाही, तसेच ३१ डिसेंबर, १ जानेवारी, बुध्दपौर्णिमेचा दिवस आणि त्याच्या आदला दिवस ( प्राणीगणनेमुळे ) परवानगी मिळत नाही. तरीही भैरवगडावर पावसाळ्यात जाण्याची परवानगी मिळाल्यास जळवांचा त्रास फार मोठ्या प्रमाणात होतो, हि गोष्ट लक्षात ठेवावी आणि यापासून बचाव करण्यासाठी मीठ व हळद सोबत घेऊन जावे.
        या पुर्वी "चाफ्याचा खडक" या हेळवाकजवळच्या धनगरवाड्यामार्गे मी व माझा मित्र प्रशांत याने जाण्याचा प्रयत्न केला, परंतु वाटाड्यांनी वाट दाखविण्यासाठी खुपच मोठी रक्कम मागितली. ती देणे परवडणारे नव्हते. तसेच हा रस्ता खुप लांबचा आहे. नुसत्या भैरवनाथाच्या मंदिरात पोहचण्यासाठीच जवळपास संपुर्ण दिवस जातो.
 धनगरवाड्यातून थेट भैरवगडाला जाण्यासाठी एक वाट आहे, तर दुसरी वाट रामघळ पाहून तिथून थेट वर चढून या पहिल्या वाटेला मिळते. या ओढ्यात पाणी भरुन चालायला सुरवात केली कि दहा मिनीटात एका पठारावर पोहचतो. तिथे उजवीकडची गुरांची वाट सोडून देउन डावीकडची मळळेली वाट पकडायची. हि वाट एका दरीच्या काठाकाठाने गर्द झाडीतून डोंगराच्या उघड्या टोकावर येते. रामघळीपासून ईथेवर येण्यासाठी साधारण दिड तास लागतो. इथून खाली नदीचे पात्र दिसते. त्या दिशेने उतरुन नदी पार करायची. यानंतर समोर जुन्या वाघेना या गावाचे अवशेष दिसतात. आज इथे एखादे झोपडे आहे. १९६७ च्या कोयनेच्या प्रलयांकारी भुकंपानंतर हे गाव येथून उठले.
 पुढे नदीच्या उजव्या काठाने परंतु टेकडीजवळच्या रस्त्याने निघायचे. पंधरा मिनीटात रस्ता पुन्हा दाट झाडीत शिरतो. त्या झाडीतुन वाट एका ओढ्याजवळ वाट उतरते.
हा ओढा ओलांडला कि वाट खड्या चढावरुन वर एका गवताळ पठारावर पोहचते. हि वाट नंतर पाथरपुंज ते भैरवगड या रस्त्याला मिळते. या वाटेच्या शेवटी आपल्याला भैरवनाथाचे मंदिर दिसू लागते. हि सर्व वाटचाल म्हणजे अनोखी जंगल भ्रमंती आहे. हिचा अवश्य अनुभव घ्यावा अशीच हि भ्रंमती आहे, मात्र वनखात्याने भैरवनाथ मंदिरात आणि या परिसरात मुक्कामाला बंदी केल्याने एका दिवसात हि वाटचाल शक्य असल्यासच हा पर्याय निवडावा. तेव्हा या मार्गे जायचे तर आम्हाला मुक्कामाची तयारी करुन जाणे भाग पडले असते. अखेरीस रामघळ पाहून परतण्याचा निर्णय घेतला.
    धनगरवाड्यापासून रामघळ अवघी दहा-पंधरा मिनीटाच्या अंतरावर आहे
 एका धबधब्याखाली खोल कपार तयार झालेली आहे. समर्थ रामदास या रम्य ठिकाणी शके १५९६ च्या आषाढात राहिले होते. रामघळ राम ओढ्याच्या वहाळात पुर्वेस तोंड करुन खोदली आहे. समोर दिसणारी अर्धगोलाकार दरी म्हणजे निसर्गनिर्मीत कलोसियमच जणु.  स्वच्छ हवेत इथे आल्यास अगदी समोर पाटण जवळचा मोरगिरी किल्ला दिसतो.
या रामघळीतूनच एक पाण्याच्या पाइपने धनगरवाड्याला पाणी पुरवठा केला आहे. रामघळीच्या माथ्यावरुन पावसाळी धबधबा पडतो.
हा धबधबा जरी बारमाही असला तरी, पाउस संपता संपता इथे येणे चांगले. या परिसरात जळवांचा त्रास मोठ्या प्रमाणात होतो.
रामघळीत उभारल्यास आपण धबधब्याच्या मागे उभे असल्याने पाण्याची पातळ चादर समोर पडते आहे असे वाटते. अर्थात हेळवाक, कोंढावळ धनगरवाडा हा विलक्षण कच्चा रस्ता असल्याने पावसाळ्यात धबधबा एन भरात असताना येथे येणे सोयीचे नाही.
   धनगरवाड्याचा पर्याय बाद झाल्यानंतर आम्हाला चिरंबेमार्गे नाव ते पाथरपुंज ह्या गाडीरस्त्याविषयी समजले. या सगळ्या अडचणीचा विचार करुन आम्ही चौघा मित्रांनी भैरवगड मोहिम आखली आणि एका सुप्रभाती पुरेशी तयारी करुन बाईकवरून संगमनगर ( धक्का ) पुल ओलांडून चिरंबे मार्गे नाव या गावाकडे निघालो.त्यावेळी हा संगमनगर पुल जेमतेम ऊंचीचा होता. पावसाळ्यात बहुतेक आठवडा- दहा दिवस हा कोयनामाईच्या पोटात गुडूप व्हायचा आणि पैलतीरावरच्या गावकर्‍यांचे डोळे आभाळाकडे लागायचे, 'पाउस उघडीप केव्हा देतोय'. आता मात्र उंच पुल झाला आहे.असो.
    पुल ओलांडून चिरंबे गावात पोहचलो, तो शाळकरी मुले भेटली, त्यांनी ' पाथरपुंज डोंगरात लई लांब हाये आणि ततंपासून बैरामगड पुढ हाये, रस्ता बी लयी खराब हाय' हि शुभवार्ता दिली. अर्थात कोणत्याही परिस्थितीत भैरवगड बघायचाच हा निश्चय केलेल्या आमच्या चमुच्या मनोधैर्यावर कोणताही परिणाम झाला नाही, "अभी नही तो कभी नही".
     चिरंब्यावरुन एक रस्ता नाव या गावाकडे वर चढत होता, आम्ही या रस्त्याने जाणार आहे हि खबर पसरल्यामुळे कि काय, सार्वजनिक बांधकाम खात्याने नेमका तोच मुहुर्त काढून रस्त्याच्या पिचिंगचे काम हाती घेतले होते. रस्त्यावर टोकदार खडी पसरुन त्यावरुन रोडरोलर फिरवून रस्त्याचे काम सुरु होते. त्यावरुन बाईक नेताना प्रचंड कसरत करावी लागली. रस्त्याच्या मधून गाडी न्यावी, तो टोकदार दगडामुळे चाक पंक्चर होण्याचा धोका, कडेने न्यावी, तर त्याबाजुला दरी. शेवटचा चढ तर माती भरला होता, त्या मातीत चाक रुतून जागेवर फिरु लागले आणि मातीत रुतायला लागले.अखेरीस कसेबसे नाव गावाच्या सपाटीवर आलो आणि लांबवर कोयना धरणाच्या भिंतीचे आणि निळ्याशार शिवसागराचे दर्शन झाले. मात्र फार वेळ घालवून चालणार नव्हते, अजून बराच पल्ला गाठायचा होता. या सपाटी नंतर वाट थोडी खाली उतरली आणि एक अवघड वळण घेउन वर चढू लागली. हि वाट मस्त, दाट झाडीतून जात होती. मात्र दगडाच्या टेंगळावरुन गाडी चढवताना तोंडाला फेस आला. इथेच वनखात्याची हद्द दर्शविणारे कंपाउंड आणि गेट लागले. अर्थातच चौकीदाराचा पत्ता नव्हता. यानंतर पुन्हा मातीचा रस्त्याने एक खडे वळण घेउन वरच्या सपाटीवर पोहचलो. वाटेत नजर जावी तिकडे हिरव्या रंगाचा दाट वनसागर पसरला होता. जंगल विलक्षण बोलके होते, पार्श्वभुमीला निरनिराळ्या पक्षांचे आवाज आणि वन्यप्राण्यांचे साद चालु होते. या रस्त्याने दर रविवारी कोयनानगरवरुन खाजगी वहातुक करणारी जीप येते असे आम्हाला समजले. हे असे जीप ड्रायव्हर शोधून त्यांना फॉर्म्यला वनचे ट्रेनिंग द्यायला हरकत नाही.
     सपाटीवरुन पुढे जातो, तो कुत्र्यांनी भुंकून आमचे स्वागत केले. या गर्द अरण्यात अजून काही गावे चिकाटीने वस्ती करुन राहिली आहेत, त्यापैकी एक, "कोळणे". काही गुंठा जमीन, त्यात येणारी भात, नाचणी अशी पिके, जंगलाच्या कृपेने मिळणारा आंबा, फणस, करवंदे, जांभुळ हा रानमेवा कराड, पाटण, कोयनानगर, चिपळूण येथे विकायचा हेच काय ते उत्पन्नाचे साधन असणारे हे वनवासी काय चिकाटीने बापजाद्याने वसवलेल्या जमीनीवर तगून राहिलेत.
   यानंतर एक ओढा ओलांडून आमचा प्रवेश पाथरपुंज या शेवटच्या मानवी वस्ती असलेल्या गावात झाला. इथून पुढे थेट कोल्हापुर-रत्नागिरी मार्गावरच्या उदगिरी या गावापर्यंत मानवी पाउलखुणा सापडत नाहीत. फक्त आणि फक्त जंगल. पाथरपुंज अड्यानिड्या जागी असले तरी इथे प्राथमिक शाळा आहे, गावात वीज आली आहे आणि घरांवर चक्क डिशअँटेना आहेत. मागे आम्ही यामार्गे प्रचितगडाला जाण्याचा प्रयत्न केला होता, तेव्हा गावातील परशुराम नावाच्या वाटाड्याला बरोबर घेतले होते. तो रस्ता दट जंगलात इतका हरविला होता कि वाट न सापड्लयाने आम्ही एका सड्यावर मुक्काम केला आणि परत आलो. आम्ही पाथरपुंजात प्रवेश करायला आणि हा परशुराम समोर यायला एकच गाठ पडली. एकदाची ओळख पटल्यानंतर त्याने आम्हाला पुन्हा येण्याचे आवतान दिले आणि भैरवगडाकडे जाणारी वाट दाखवली.
        भैरवगड ते प्रचितगड असा 2 दिवसांचा ट्रेक करता येतो. या ट्रेकमध्ये रात्रीचा मुक्काम जंगलात करावा लागतो. त्यासाठी तंबू बरोबर घेऊन जावा. जंगलात वन्य पशुंचा वावर मोठ्या प्रमाणात आहे. प्रचितगडच्या आजूबाजूचे अभयारण्य "टायगर रिझर्व" घोषित केल्यामुळे वनखात्याची लिखित स्वरूपातील पूर्वपरवानगी घेतल्याशिवाय गडावर जाता येत नाही, तसेच जंगल खात्याच्या कारवाईच्या भितीने सध्या मात्र वाटाडेही प्रचितगडावर यायला तयार होत नाहीत.
हा रस्ता एखादी जीप जाईल ईतका प्रशस्त पण कच्चा आहे. याच रस्त्याला एके ठिकाणी हेळवाक-कोंढावळ धनगरवाडामार्गे येणारी वाट मिळते.
  अर्ध्या- पाउण तासातच आम्ही एक मस्त उतार ओलांडून भैरवनाथ मंदिरासमोर दाखल झालो.
मंदिरा समोरच्या प्राकारात तुळशीवृंदावन, शंकराच्या पिंडीचा चबुतरा दिसतो.
 पुर्वी हे मंदिर प्रशस्त आणि कौलारु होते. आता मात्र या राहाळातील मुंबईला रहाणार्‍या गावकर्‍यांनी एकत्र येउन मंदिराचे नवनिर्माण केलेले आहे.
आता मंदिर तर प्रशस्त झालेले आहेच, पण पुढे पत्राचा मांडव केल्याने मंदिरात सध्या किमान शंभरजण आरामात झोपु शकतात.
पण आम्ही नेमक्या कोणत्या वाईट मुहुर्तावर बाहेर पडलो होतो याची कल्पना नाही, कारण इथेही मंदिराचे बांधकाम सुरु होते. बांधकाम करणारर्‍या गंवड्यांची लगभग सुरु होती. मात्र बांधकामामुळे मंदिराचे दरवाजे बसवले नव्हते, सहाजिकच बंदिस्त मंदिरात सुरक्षित मुक्काम आम्हाला करता येणार नव्हता.
वन्यप्राणी विशेषतः अस्वल, गवे आणि बिबटे असणार्‍या जंगलात उघड्यावर मुक्काम म्हणजे आत्मघात ठरला असता, सहाजिकच मंदिराच्या स्लॅबवर चढून आम्ही वर मुक्काम करण्याचा निर्णय घेतला.
बरोबर आणलेल्या कॅरीमॅट, शेकोटी पेटविण्यासाठी आणलेले रबरी टायर, सॅक या सर्व वस्तुंची स्लॅबवर व्यवस्था लाउन आधी भैरवनाथाच्या दर्शनासाठी गाभार्‍यात गेलो.

दरीच्या काठाशी या मंदिराने अचुक जागा पकडली आहे. आत अरण्याचा राजा भैरोबा डोळे वटारुन बसला आहे.
 मंदिरात भैरी देवी, श्री तुळाई देवी, श्री वाघजाई देवी यांच्या २ ते ३ फुट ऊंचीच्या मूर्ती आहेत. चैत्र वद्य प्रतिपदेला इथे यात्रा असते, तीच ईथेली वर्दळ, एरवी सुट्टीदिवशी येणारे गडभटके आणि हौशी पर्यटक सोडले तर या भैरवनाथाला सक्तीचा एकांतवासच नशीबी लिहीला आहे.
मंदिराच्या समोरच एक धातुचा शिवपुतळा पाटणच्या दुर्गप्रेमी शिवभक्तांनी एका चौथर्‍यावर  बसविलेला आहे,
तिथेच शेजारी माहितीफलक देखील लावण्याचा स्त्युत्य उपक्रम केला आहे.
मुक्काम करायचा तर पाण्याची व्यवस्था महत्वाची. मंदिराच्या मागच्या बाजुला मंदिराच्या कोकणातील गोवळ पाती गावात उतरणारी वाट आहे या वाटेने ५ मिनिटे खाली उतरल्यावर एक चौकोनी विहिर आहे. या विहिरीला बारमाही पाणी असते. आम्ही एन मे महिन्यात गेल्याने पाणी खुपच कमी होते, मात्र थोड्या थोड्या वेळाने पाणी झिरपून विहीर भरत होती. आमच्याकडच्या बाटल्या भरुन एका सॅकमधे घेतल्या आणि गडदर्शन करण्यासाठी निघालो.
बहुतेक किल्ल्याप्रमाणे भैरवगडसुध्दा एका चिंचोळ्या धारेने सह्याद्रीच्या मुख्य रांगेला जोडला गेला आहे.
उजव्या बाजुला दरीत रत्नागिरी जिल्ह्यातील, चिपळूण तालुक्यातील दुर्गवाडी, पाथ, मंजुत्री, फुरुस हि गावे उत्तरेला दिसत होती, पैकी दुर्गवाडी गावातून एक वाट पुर्ण सह्याद्रिची धार चढून भैरवनाथ मंदिराच्या मागे येते.
तर वाटेच्या दक्षिणे बाजुला म्हणजे डाव्या हाताला एक वाट गोवळपाती गावात उतरते. या वाटेने थोडे उतरुन गेलो, तो हादरलोच. एका गव्याचा शेणाचा परातभर पो पडला होता. म्हणजे गवे या वाटेने ये जा करत होते.
गव्यांना आज तरी या वाटेने येण्याची बुध्दी होउ नये अशी प्रार्थना करुन आम्ही गडाच्या दिशेने निघालो. वाटेत दगडाच्या कपारींचा खच पडला आहे. वर कड्यात एक नैसर्गिक गुहा आहे. थोडे अंतर पुढे गेल्यानंतर एक बांधीव बुरुज लागला. या बाजुने होणार्‍या सैन्याच्या हालचालीवर देखरेख ठेवण्यासाठी हा बुरुज उभारला असावा.

या बाजुला सह्याद्रीची कातळधार उतरत्या उन्हात मोठी मनमोहक दिसत होती.
गडाचे कोकणात कोसळणारे कडे आणि त्याला चिकटलेला सुळका मोठा थरारक दिसत होता.
गडाला तीन प्रवेशद्वारे असली तरी त्यातल्या त्यात पहिला दक्षिणमुखी दरवाजा थोडाफार तग धरुन आहे, बाकीचे दरवाजे नामशेष झालेले आहेत. या दरवाजातून पुढे गेल्यावर समोरच्या टेकाडाच्या चढावावर दुसरा दक्षिणाभिमुख दरवाजा आहे. हा दरवाजाही ढासळलेला आहे.
भैरवगड दोन टेकड्यांनी मिळून बनला आहे. दोघांच्या खिंडीमधुन पलीकडे जाउन पश्चिमेच्या टेकडीवर जाता येते. इथून खाली गोवळपात या गावाकडे उतरणारी कड्याची धार दिसते.
 याच बाजुला पुन्हा पुर्वे बाजुच्या टेकडीवर आले कि एक कातळकोरीव पाण्याची दोन टाकी आहेत. यातील पाणी पिण्यास उपयुक्त असून ते बारमाही असते. इथे थोडी सपाटी आहे. तिथे एक चुल आणि जळालेली लाकडे दिसली. याचा अर्थ आम्ही येण्याच्या आधी कोणीतरी गडावर मुक्काम केला असणार.
पाण्याच्या टाक्यातील पाणी मनसोक्त पिउन आणि बाटल्यात भरुन आम्ही दाट झाडीतून माथ्याकडे निघालो.
माथा तसा चिंचोळा आणि फारचे अवशेष नाहीत, बहुधा झाडीने गिळून टाकले असावेत. मात्र सगळ्या बाजुने खोल दर्‍या आहेत.
माथ्यावरुन समोर भैरवनाथ मंदिर आणि तिथे काम करणार्‍या गवंड्याचा कोलाहल एकु येत होता. मे महिना असल्याने माथ्यावरची जंगली जांभळांची झाडे भरली होती, अर्थातच त्याचा मनसोक्त आस्वाद घेउन खाली उतरलो.
गडावरून लांबवर पसरलेलं कोयनेचं दाट जंगल दिसते. गडमाथा तसा अरुंदच आहे, त्यामुळे २ तासात गड फिरून होतो. हवा स्वच्छ असेल तर दक्षिणेला प्रचितगडाची धार तर उत्तरेला जंगली जयगडाची सोंड दिसते. ह्या माथ्यावर उभारलो तर गडाची उंची ३००४ फुट चांगलीच जाणवते. गडावर मानवी वावर फार नसला तरी जनावरांचा बर्‍यापैकी राबता असल्याचे ठश्यावरुन जाणवते.
    मंदिराकडे येणार्‍या कच्च्या रस्त्याने चालत जाऊन डावीकडे दरीत उतरणार्‍या वाटेने ५ मिनिटे खाली उतरावे, येथे सुद्धा पाण्याचं एक टाकं आहे. मात्र हे पाणी मार्चपर्यंतच असते.
  खाली उतरुन मंदिरात परत येउन टेकतोय, तोच गवंड्यानी आवराआवर सुरु केली. फार उशीर होण्याच्या आतच त्यांना पाथरपुंज गाठायचे होते. एकदा त्यांचे आवाज यायचे बंद झाले आणि आम्हाला जाणिव झाली, आपण या अटंग्या वनात एकटे आहोत. जवळची मानवी वस्ती अगदी गाडीने गेलो तरी अर्ध्या-पाअण तासावर होती. सुर्यास्त झाला तसे जंगलातून निरनिराळे आवाज भिती घालू लागले. जंगलातील मुक्कामाचा एक थरारक अनुभव आम्ही घेत होतो. रात्री पाणवठ्यावर जायला लागु नये म्हणून पुरेसे पाणी आणून ठेवले होते. जरी देवळाच्या स्लॅबवर आम्ही सुरक्षित असलो, तरी नेमेके एक झाड थेट स्लॅबवर आलेले होते, त्या झाडावर चढून एखादा बिबटा आमच्यापर्यंत पोहचू शकत होता. अखेरीस चौघांपैकी दोघा दोघांनी तासतासभर जागे रहायचे ठरविले आणि खिचडी शिजायला ठेवली. खाली कोकणातील रेंज असल्याने घरच्यांना फोन करुन झाले आणि इतरही फोन येत होते. केलेला फोन कोठे घेतला जातोय हे बघायची सोय असती तर आम्ही कोयनेच्या जंगलात कशाला कडमडलोय? हा प्रश्न नक्कीच अनेकांना पडला असता.
   खिचडी शिजता शिजता गप्पा सुरु झाल्या. विषय वळाला या गडाच्या ईतिहासाकडे. या गडाच्या जवळून उतरणार्‍या घाटवाटा तश्या दुय्यम असल्याने आणि गडावर जागा बेताची असल्याने या गडाला ईतिहासात फार महत्व नाही.या गडाचा वापर केवळ टेहळणीसाठी असावा असे येथील बांधकामावरून दिसते. ग्रँट डफच्या मते, पन्हाळ्याच्या दुसरा शिलाहार भोजाने या गडाची उभारणी केलेली असावी. यानंतर बहामनी कालखंडापासून शिर्के घराण्याच्या राजधानीचे ठिकाण म्हणून भैरवगड प्रसिध्द होता.इ.स. १४५३ मधे मलिक उत्तेजारने हा गड घेतला.  मराठी कागदपत्रामधे गडाचा उल्लेख सारंगगड आणि भैरवगड अश्या दोन्ही नावानी येतो. गडावर असलेल्या काळभैरव मंदिरामुळे याला भैरवगड किंवा बहिरवगड म्हणतात. शिवकाळात आदिलशाहीचे या प्रदेशावर नाममात्र वर्चस्व होते. शिवाजी महाराजांनी सन १६६१ च्या सुमारास दक्षिण कोकण जिंकण्यासाठी स्वारी केली, त्यात शृंगारपुरवगैरे ठिकाणे घेतली, त्यात भैरवगड त्यांच्या ताब्यात आला. तो अखेरपर्यंत मराठ्यांच्या अंमलाखाली राहिला. मराठ्यांबरोबर झालेल्या शेवटच्या युध्दात २३ मे १८१८ रोजी हा गड कर्नल केपनने ताब्यात घेतला.
   
    राहिलेल्या खिचडीचा नाष्टा उरकून बाईकवर स्वार होउन गडाचा निरोप घेतला आणि त्याच प्रशस्त रस्त्याने निघालो, तो एका भल्या मोठ्या शेकरूने झाडावर दर्शन दिले. कॅमेरा काढेपर्यंत ती उड्या मारत अदृष्य झाली सुध्दा. पुन्हा एकदा रस्त्याची कसरत करुन संगमनगर पुलाजवळ जेवणासाठी थांबलो. मागच्या बाजुला पसरलेला गर्द जंगलाच्या वनराईचे घोंगडे पांघरलेला सह्याद्रीचा निरोप घेतला. एक अनगड दुर्ग बघण्याचे स्वप्न पुरे झाले होते.




लिंब बारामोटेची विहिर   

     मानवी वसाहती ह्या जलसंस्कृतीच्या काठावर वसल्या आणि हजारो वर्ष विकसित होत राहिल्या. पाणी ही मानवाची प्रमुख गरज असल्याने पाण्यास "जीवन" हे नाव दिले असावे. नदी, तलाव, तळी, विहिरी ह्या मानवी जीवनातील पाण्याची महत्त्वाची गरज पूर्ण करणारी साधन आहेत, पण प्रत्येक ठिकाणी पाणी उपलब्ध होईलच हे शक्य नसल्यामुळे मानवाने डोंगराच्या उतारादरम्यान तळी निर्माण करणे, गावाशेजारील ओढ्यास बंधारा बांधणे, इत्यादी माध्यमातून पाण्याची उपलब्धता करून आपल्या दैनंदिन जीवनात वापरासाठी व शेतीसाठी नियोजन केल्याचे दिसून येते.
    पाण्यासाठी योग्य ठिकाणी विहीर, बारव, आड खोदण्याची परंपरा फार प्राचीनकाळापासून अस्तित्वात आहे. शिवकाळात देखील प्रत्येक किल्ल्यावर पाण्याच्या सुविधेला जाणीवपूर्वक विशेष महत्त्व दिले होते. परकीय आक्रमाकांच्या प्रतिकारासाठी लढाऊ सैन्य, दारुगोळा, शस्त्रास्त्र जसे महत्त्वाचे होते, तसेच अन्नधान्य व पाणी हे आपल्या सैन्याची ताकद होती. शिवकाळात राजमाता जिजाऊ ह्या आपल्या द्वितीय पुत्र छ. शिवाजी महाराजांना घेऊन पुण्याच्या जहागिरीचा कारभार पाहात होत्या. बाल शिवबासह खेडे बारे येथे त्या वास्तव्यास असताना, शाहजी राजांच्या नावाची पेठ व आंब्याची बाग " शहाबाग" निर्माण केली होती. आब्याच्या बागेला व मानवी वसाहतीस मुबलक पाणी मिळावे म्हणून त्यांनी छोटेखानी धरण देखील बांधले होते. शिवकाळातील आंब्याच्या बागेमुळे आजही हे ठिकाण "शिवापूर बाग" याच नावाने ओळखले जाते. मध्ययुगीन ऐतिहासिक कालखंडातील आंब्याच्या बागेसाठी पाण्याची व्यवस्था करणारी पहिली कर्तबगार महिला ह्या जिजाऊसाहेब असू शकतात.
     इतिहासाची पुनरावृत्ती होत असते, याचीच प्रचिती सुमारे शंभर वर्षांनी झाल्याचे इतिहासाने पाहिले आहे. स्वराज्याच्या सातारा गादीचे छत्रपति शिवाजी उर्फ शाहू महाराजांच्या काळात श्रीमंत विरुबाई भोसले या कर्तबगार महिलेने लिंब (शेरी वस्ती.सातारा) येथे कृष्णा नदीच्या लगतच बारा मोटेच्या विहिरीची निर्मिती केली. छ. शाहू महाराज, महाराणी येसूबाईसाहेब व इतर कुटुंबातील सदस्य मोगल बादशहा औरंगजेबाच्या कैदेत असताना बादशहाने छ. शाहूला मुलगी दाखविण्यासाठी रूपवान अशा विरूबाईस पाठविले. पुढे शाहू महाराजांचे सगुणाबाई व सकवारबाई यांच्याशी विवाह झाले मात्र विरूबाई या उपस्त्री म्हणूनच त्यांच्याकडेच राहिल्या. २० फेब्रुवारी १७०७ मधे अहमदनगर जवळच असलेल्या भिंगार येथे औरंगजेबाचा नैराश्य व वृद्धापकाळाने मृत्यू झाला. औरंगजेबाच्या मृत्यूमुळे त्याच्या मुलांमधे दिल्लीच्या गादीसाठी यादवी सुरू झाली. शहाआलम उर्फ बहादुर शहा या औरंगजेबाच्या मुलाने मुघलांच्या गादीचा वारस म्हणून ५ मार्च १७०७ ला स्वतःस  राज्यारोहन करून मुघल राजधानी दिल्लीच्या दिशेने प्रवास सुरू केला. परतीच्या वाटेवर असताना दारोहा येथून शाहू महाराजांची काही अटी व शर्थीवर सुटका केली व महाराणी येसूबाईसाहेब, विरूबाई व इतरांना आपल्याबरोबर पुढे दिल्ली येथे नेले. पुढील काळात छ. शाहूंनी सातारा येथे मराठा राज्याची राजधानी निर्माण केली परंतु मातोश्री व इतर कुटुंब कबिला हा मोगलांच्याच ताब्यात दिल्ली येथे होता. या सर्वांना सोडविण्याची संधी दिल्लीच्या कारभारातील प्रमुख असलेल्या सय्यद बंधूंच्या निमित्ताने आली. पहिले पेशवे बाळाजी विश्वनाथ भट यांनी येसूबाईसाहेब, रक्षा बिरूबाई व इतरांना इ. स. १७१९ मधे दिल्ली येथून मोगल कैदेतून मुक्त करून सातारा येथे आणले. अशा या बिरूबाई भोसले यांच्याकडे छ. शाहू महाराजांच्या दरूणी महालाची ( जनानखाना) व्यवस्था होती. सर्व तिच्या आज्ञेत वागत. फत्तेसिंह भोसले यांच्यावर तर तिचे पुत्रवत प्रेम होते. दरूणी महालात खोजा म्हणून असलेला वाणी जातीचा बसवंतराव कासुरडे व बिरूबाई एकाच जातीचे असल्याने त्यांना एकमेकांप्रती विशेष अभिमान होता.  बिरूबाई भोसले यांनी लिंब येथे बांधलेल्या विहिरीच्या शेजारीच बसवंतराव कासुरडे याने एक टोलेजंग वाडा बांधला होता, मात्र आजमितीस तो अस्तित्वात नाही. बिरूबाई भोसले यांनी परळी ( सज्जनगड) येथे समर्थ रामदास स्वामींच्या समाधीसमोर आपल्या नावाने भव्य तुळशीवृंदावन व शंभू महादेवासमोर दगडी दीपमाळ स्वखर्चातून बांधल्याची नोंद आढळून येते. लिंब येथील बारा मोटेच्या विहीरीच्या परिसरात सुमारे  ३०० आंब्याची बाग लावली होती. या बागेला बारमाही पाणी मिळावे म्हणून इ. स. १७१९ - १७४० च्या दरम्यानच्या कालखंडात ही विहीर तयार करण्यात आली असावी. अष्टाकोनी साठ फूट व्यासाच्या विहिरीस पाणी उपसा करण्यासाठी बारा मोट असल्यामुळे, या विहीरीला "बारा मोटेची विहीर" म्हणून संबोधण्यात येते. हिची खोली १०० फूट व व्यास ६० फूट असून संपूर्ण बांधकाम घडीव दगडात केलेले आहे.  आजही ती सुस्थितीत आहे. बारा महिने या विहिरीला पाणी असते. विहिरीचे बांधकाम कोरीव दगडात आहे. विहिरीचा आकार अष्टकोणी असून एखाद्या शिवलिंगा सारखा भासतो.  विहिरीचे दोन भाग आहेत अष्टकोनी आकाराची मुख्य विहीर आणि तिला जोडणारी उप विहिर चौकोनी  आकाराची आहे. 
    सातारा शहरापासून सुमारे 15 किलोमीटर अंतरावर लिंब हे गाव आहे. हे गाव सध्या 
             संग्रही असलेला ड्रोन द्वारे घेतलेला विहिरीचा फोटो. मुख्य विहिरीचा अष्टकोणी आकार तर उप विहिरीचा चौकोनी आकार                      
           विहिरीत उतरण्यासाठी दगडी फरसबंदी पायऱ्या आहेत तर आत उतरण्या अगोदर विहीरीच्या आकारमानाकडे पाहिल्यास भगवान शंकराच्या पिंडीच्या आकाराची ही विहीर असल्याचे सहजच लक्षात येते. काही पायऱ्या उतरुन गेल्यावर चौकोनी आकाराच्या तटबंदीत आल्याचे जाणवते. शेवटच्या पायरीपासून दगडी साकव लागतो. साकवाच्या दोन्हीही बाजूला रूंद दगडी बांधकामातील आयताकृती भलेमोठे हौद असावे असा देखावा दिसतो, तर त्या हौदात उतरणा-या लहान पायऱ्या आपले लक्ष वेधून घेतात. आपण ज्या दगडी साकवावर उभे असतो त्याच्या खाली कमानीचा भाग दोन्ही हौदांना जोडणारा पाहून तत्कालीन स्थपत्तीच्या (बांधकाम अभियंता) ज्ञानाचा आवाका किती असेल याचा अंदाज येतो. याच कमानीवर वीरूबाईंनी ही विहीर बांधली असल्याचा शिलालेख कोरलेला आहे.  शेवटच्या पायरी वरुन सपाट दगडी फरसबंदीवर पाय ठेवल्या बरोबर समोर दिसणारे दृश्य अचंबित करणारे आहे. मुख्य विहिरीला जोडणारा दगडी कमानी भाग, तर त्याच्यावर दगडी खांबाचा नक्षीदार सज्जा
    मुख्यविहिरीत उतरण्यासाठी दोन्ही बाजूला जिने आहेत ते एका महाल वजा हॉलमध्ये निघतात. येथे खांबावर गणेश , मारुती , अश्वारूढ छत्रपती शिवाजी महाराज यांची शिल्पे कोरलेली आहेत. 
विविध पक्षी, चित्रे ही दगडी भिंतीतून बाहेर डोकावताना पाहून आपल्या पूर्वजांच्या कलासक्त जीवनशैलीचा प्रत्यय आल्याशिवाय राहत नाही. कमानीच्या दोन्ही बाजूची गजशिल्प वैभवशाली अभिरुचीची साक्ष देते. पुढे चालत गेल्यावर कमानीतून विहिरीचे पाणी पाहून आनंद वाटतो, तर कमानीच्या भिंतीच्या दोन्ही बाजूला लहान दगडी दादर असून त्याद्वारे आपण नक्षीदार दगडी खांबावर आधारलेल्या आयताकृती महालात प्रवेश करतो. भर उन्हाळ्यात देखील येथील वातावरण शितल असते. आता एका सज्जातून विहिरीतील पाणी दिसते, तर दुसऱ्या सज्जातून पायऱ्या उतरुण आलेली कमान व ती चौकोनी  दगडी भिंतीतील साकव दिसतो. विहिरीतील एकच पाणी मात्र खालच्या कमानी, दगडी महल व मोटेच्या ठिकाणाहून वेगवेगळे भासते.
  आता दगडी महलातील सौंदर्य पाहिल्यावर पूर्वेस एक दगडी दादर आहे, त्यातून वर आल्यावर आपण विहिरीच्या भूपृष्ठावर असतो. विहीर बांधकामात वरच्या अंतर्गत भागात चार दिशेला चार शिल्प दिसून येतात. गजावर आरुढ झालेला शरभ आहे. हे शिल्प शक्तीवर विजय मिळविल्याचे बुद्धी चापल्य दर्शविते.

वीरुबाईसाहेबांचा शिलालेखमोटेखालती असलेले शरभ
पेशव्यांच्या, शाहुंच्या अनेक खासगी बैठकी, निवांत क्षण यांना साक्ष असलेली ही विहीर प्रसिद्ध झाली, ती तिच्या भिंतीवर कोरलेल्या व्याल आणि शलभ शिल्पांमुळे! व्याल म्हणजे वाघाचे तोंड आणि सिंहाचं शरीर. ही शिल्पं राज्याची समृद्धी आणि पराक्रमाचं प्रतीक ठरतात. विहीरीच्या दक्षिण दिशेला ४ हत्तींवर आरूढ झालेल्या वाघाचं शिल्प दक्षिणेतील मराठ्यांचे वर्चस्व प्रदर्शित करते आणि उत्तरेकडे असलेली झेपावणारी व्याघ्र शिल्पं पुढच्या उत्तरेकडील मोहिमेचा संकेत देतात. अष्टकोनी विहीरीच्या प्रत्येक कोनात नागदेवतेची मूर्ती आहे. विहीरीतील खासे बैठकीत कमळ, हत्ती, गणपती, मारुती ही शुभ चिन्हं चितारली आहेत. घुमटाकार चौकटींना पडदे अडकवण्यासाठीच्या  खुंट्या पण आहेत. महाराजांची गोपनीय खलबतं करण्याची ही जागा असावी असा समज आहे. विहिरीच्या वरच्या बाजूस पत्थरात  घडवलेले आसन आहे  ज्याच्यावर बसून शाहूमहाराज रयतेशी  हितगुज करत. हे कातळ  पत्थरातील  शिल्प पाहून, शिवकालीन आपली स्थापत्यकला किती प्रगत होती याचा अभिमान वाटतो.विहीर बांधताना दगड एकमेकांना जोडण्यासाठी चुना सिमेंट अशा कोणत्याही गोष्टीचा वापर केला नाही. संपूर्ण दगडातून अतिशय कोरीव शिल्प उभं केलं आहे.     
या विहिरीचे संपूर्ण बांधकाम चुण्यामध्ये केले असल्याने ते इतक्या वर्षानंतरही भक्कम आहे. हिच्या निर्मितीसाठी चांगल्या प्रतीचा दगड वापरण्यात आला आहे. यासाठी डोंगरातून खाण लावून दगड घडविले असतील. दगडी खाणीपासून विहिरस्थळापर्यत अवजड घडीव दगड आणण्याचे कठीण काम करावे लागले असेल. मनात प्रश्न येतो की, कशी केली असेल दगडांची वाहतूक ? मला ही हा प्रश्न पडला. मग मी विचार करु लागलो आणि काहीतरी शोधू लागलो. तर विहिरीच्या पायऱ्या उतरण्यासाठी सुरवात करतो, तेथे उजव्या हाताला काही अंतरावर दोन दगडी चाके असल्याचे दिसून आले. प्रश्ना शेजारीच उत्तर ! गाडबगाडेच्या गाड्यास देखील असेच दगडी चाक असते. बैठ्या लाकडी बैलगाड्यास दगड वाहतूक करण्यासाठी अशी भक्कम दगडी चाके पूर्वी वापरात होती. अशा या कर्तबगार रक्षा बिरूबाई भोसले यांचे सातारा दरबारी कामकाजात विशेष महत्त्व असल्याचे काही प्रसंगात दिसून येत होते, कारण पहिले पेशवे बाळाजी विश्वनाथ यांच्या निधनानंतर दुसरे पेशवे म्हणून त्यांचेच पुत्र बाजीराव बाळाजी यांना छ. शाहू महाराजांनी पेशवाईचे वस्त्रे दिल्यावर, रक्षा बिरूबाईने पेशवा बाजीराव पंडित यांस ११० रुपये किंमची व चिमाजी अप्पा पंडित यांस १०० रुपयेची वस्त्रे भेट म्हणून दिली होती. अशी ही कर्तबगार रक्षा बिरूबाई भोसले २४ डिसेंबर १७४० रोजी निधन पावली आणि त्याचवर्षी म्हणजे इ. स. १७४० मधे पेशवे बाजीराव व त्यांचे बंधू चिमाजी अप्पा देखील परलोकवासी झाले. शिखर शिंगणापूरच्या शंभू महादेव मंदिराच्या ओव-यात वीरूबाईंचा मानसपुत्र फत्तेसिंह भोसले यांनी त्यांच्या स्मरणार्थ शिवलिंग स्थापन केल्याचा उल्लेख ' श्रीमंत महाराज भोसले बखर' मधे येतो. 
लिंब हे गाव बारा मोटेच्या विहिरीमुळे इतिहासात प्रसिद्ध असले तरी काही कटू आठवणी देखील आहेत. इंग्रज राजवटीच्या सुरूवातीच्या काळात सातारा गादीवर छत्रपति प्रतापसिंह महाराज होते. इंग्रज प्रतिनिधी म्हणून सातारच्या दरबारात ग्रॅड डफ हा अधिकारी होता. इंग्रज सरकारला छत्रपतींची अडचण होत होती, म्हणून काहीतरी खोटे आरोप करुन ४ सप्टेंबर १८३९ ला मध्यरात्रीस सातारच्या छत्रपतींना मुंबई इलाख्याचे गव्हर्नर कारन्याक याच्या हुकूमाने व क्रिस्टाल याच्या मार्गदर्शनाखाली ओवान्स या अधिकाऱ्याने अर्ध्या रात्री छत्रपतींना अटक केली. छत्रपतींना सातार जवळच्या लिंब येथील एका पाटलाच्या गाई गुरांच्या गोठ्यात ठेवले. इंग्रजी कैदेत छत्रपति ९३ दिवस या लिंब गावी गोठ्यात मुक्कामाला होते. ज्या इंग्रजांच्या प्रतिनिधीने  छ. शिवाजी महाराजांना कमरेत वाकून मुजरा करुन नजराना भेट केला, त्यांच्याच वंशाजांच्या हातांनी स्वराज्याच्या छत्रपतींना अटक करून लिंब येथे ठेवले. बारा मोटेची विहीर आठवताना, न कळतच आमच्या स्वराज्याच्या अपमान करणाऱ्या कपटी, धूर्त इंग्रजांची काळी कृत्य मनाला वेदना देतात.
    विहिरीतील स्वच्छ पाण्यात पोहण्याचा आनंद घेऊ शकता, परंतु विहीर अतिशय खोल असल्याने काळजी घ्यावी. ज्यांना पोहायला जमत नाही अशांनी पाण्यात उतरू नये.
पुण्यापासून NH4(पुणे-सातारा-बेंगलोर) हायवे वरुण  साधारण १००किमी अंतरावर डावीकडे 'लिंब फाटा' लागतो.(हा फाटा अनेवाड़ी टोलनाक्या-पासून 3 किमी पुढे आहे ).हायवेपासुन आत २ किमी आत लिंब गाव असून येथून पुन्हा १ किमी अंतरावर उजविकड़ील बाजुस 'शेरी' नावाचा परीसर आहे. येथेच विहीर पहावयास मिळेल.
अलिकडे सोशल मेडीयाच्या कृपेने हि विहीर प्रसिध्द झालेली असली तरी लिंब गावात असलेला कृष्णा नदीवरचा घाट आणि पेशवेकालीन मंदिरे आवर्जून पहाण्यासारखी आहेत.   लिंब गावात कृष्णा नदीचा बांधीव घाट आपटे, ठाकूर या सरदारांचे वाडे अजूनही वासे टिकवून आहेत. गावाला नदीकाठ असल्यामुळे गौतम, अगस्त्य, परशुराम ऋषी यांच्या वास्तव्याचे दाखले मिळतात. रामेश्वर, कोटेश्वर, भार्गवरामाचं अतिप्राचीन मंदिर त्याची स्थापत्य शैली पाहण्यासारखी आहे. साहित्यिकांच्या भाषेत सर्वसंपन्न आदर्श आणि कवी कल्पनेतलं गाव अशी याची ख्याती आहे.शिवाय लिंब गावात पेरुच्या बागा आहेत.पेरुच्या मोसमात गेल्यास आवर्जून पेरु खावेत.
 देखभाल                                                       
            रवी वर्णेकर हे गृहस्थ आपल्या कुटुंब-कबिल्या सह आज या विहिरिची देखभाल करतात.इतिहासाच्या पुस्तकात दुर्लक्षित राहिलेली ही विहीर पाहण्याचे भाग्य लाभणे  म्हणजे महाराष्ट्राचे मर्दानी दैवत श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराजांची कृपा आणखी दुसरं काय.एकदा तरी या इतिहासाच्या साक्षीदाराला नक्कीच भेट दया.
माहिती साभार - रवी वर्णेकर ,राहुल धर्माजी बुलबुले आणि  रोहित पवार.























वडगावदर्याचे लवणस्तंभ

निघोजहून वडगावदर्याकडे थेट रस्ता जातो. या थोड्या कच्च्या रस्त्यावर निघोज-कान्हूरच्या दरम्यान डाव्या हाताला फुटणाऱ्या रस्त्याने वडगावदर्या गाव गाठता येतं. मात्र रस्त्यांच्या दिशा व स्थानं दाखविणारे फलक नावापुरतेच राहिले आहेत. निघोजहून निघाल्यावर घाट संपला की, एकाच ठिकाणी दोन रस्ते डावीकडे फुटतात. त्यांतील डाव्या रस्त्याने गेलं की चुकण्याची शक्यताच नाही. कान्हूर पठार हे नगर जिल्ह्यातील सर्वांत मोठं, सर्वांत उंचावर (९७० मीटर्स) असणारं पठार आहे, असे तेथील लोक सांगतात. हा सारा भाग चुनखडीने समृद्ध आहे.
वडगावदर्या गावालगत एका दरडीकडे जाणाऱ्या वाटेवर पायऱ्या आहेत खाली दर्याबाईचं गुहामंदिर आहे. शेजारीच वेल्हाबाईचंही मंदिर आहे. दोन्ही मंदिरांत चुन्याचं क्षारयुक्त पाणी वरच्या प्रस्तरातून ठिबकत असतं. त्याचा एक लवणस्तंभही तयार झाला आहे.
ठिबकणाऱ्या पाण्यात क्षारांचं प्रमाण खूप असतं. थेंब ठिवकत असतानाच त्यातील पाण्याचं बाष्पीभवन झालं तर क्षार तसेच शिल्लक राहतात. ही क्रिया वर्षानुवर्षं चालू राहते आणि मग गुहेच्या छपरातून अधोमुखी लवणस्तंभ तयार होतात. एके काळी या गुहामंदिरांमध्ये अशा लक्षात येण्याजोग्या लवणकांड्या होत्या. परंतु येथे येणाऱ्या पर्यटकांनी त्या तोडल्या. आता आहेत त्या चुन्याच्या क्षाराच्या कांड्या फारच लहान आहेत, तसंच भितीनजीक असणारे स्तंभ फारच मोठे आहेत. अमेरिकेतील व्हर्जिनिया राज्यातील शेनान दॉह खोऱ्यात असणारी लुरे गुहा आज जागतिक पर्यटन नकाशावर आपलं स्थान निर्माण करून राहिली आहे. दरवर्षी ५-१० लाख पर्यटक ती गुहा पाहण्यास येतात. उटाह या अमेरिकेतील राज्यात असणारी नेफ, न्यू मेक्सिकोमधील कार्लस्वाड, केंटुकी राज्यातील ग्रेट ओनिक्स, साऊथ डाकोटातील विंड व सिरॅक्युस ह्या ब्लॅक हिलमधील गुहा, वॉशिंग्टनजवळील क्रिस्टल तसंच सिसिलीमधील दि इयर ऑफ डायोनियस ह्या गुहा पर्यटकांचं आकर्षण स्थळ बनल्या आहेत. परंतु येणाऱ्या पर्यटकांनी ही लवणस्तंभं किंवा कांड्या यांची नासधूस करू नये. कारण एक सेंटीमीटर लांबीची लवणकांडी तयार व्हायला अनेक वर्ष लागतात.
दर्याबाईच्या मंदिरासमोर सुमारे २५ मीटर उंचीचा एक धबधबा आहे. त्याच्याजवळच एका गुहा आहे. १०-१२ मीटर खोलीच्या या गुहेत थोडंफार वाकून गेलं की, चुन्याच्या खडकांनी बनलेल्या या गुहेच्या छतावर छोटेछोटे अधोमुखी लवणस्तंभ दिसतात.
पण सर्वांत विशेष म्हणजे येथील चुनखडीच्या खडकात प्राचीन काळच्या वनस्पतींच्या पानांचे ठसे आढळतात. परंतु त्यांचं निखातीभवन अतिशय ठिसूळ अशा खडकांत झालेलं आहे. त्यामुळे ते न्याहाळताना वा हाताळताना भरपूर काळजी घ्यावी लागते. या गुहेमध्ये जावयाचं असेल, तर पावसाळ्यात जाऊ नये. जाताना बरोबर टॉर्च अवश्य घ्यावा. गुहेत आतील भागात छोट्या आकाराची वटवाघळं खूप आहेत. मोठी झुरळंही बरीच आहेत.
दर्याबाईचं मंदिर, खालचा ओढा, तेथील गुहा या भागात माकडं भरपूर आहेत. त्यामुळे खाद्यपदार्थ तेथे बसून खाणं अशक्यच बनतं.
वडगावदर्या गावाजवळच बोकडदऱ्या व आलदऱ्या अशा जागा आहेत. आलदऱ्या येथे अशी गुहा किवा झरा नाही. पण वडाच्या पारंब्यांभोवती चुनखडीचे थर जमा झाले आहेत




 कान्हूरपठार-नगर, पुणे जिल्ह्यांमधे पसरलेला एक ओसाड, रखरखीत, बोडका प्रदेश, फारशा खोल नसलेल्या पण तरीही भरपूर दर्‍याखोर्‍यांनी व्यापलेला पठारी भाग. इथल्या विशिष्ट भूरचनेमुळे त्याहीपेक्षा निसर्गाच्या किमयेने इथे भूरूपांच्या चित्रविचित्र संरचना तयार झाल्या आहेत जशी निघोजची रांजणकुंडे, गुळूंचवाडीचा नैसर्गिक शिलासेतू, वडगाव दर्याचे लवणस्तंभ. ह्या नैसर्गिक भूरूपांबरोबरच 
वडगाव दर्या नावाले अगदी साजेसे. एका खोलवर दरीत हे वसले आहे. कातळातील नैसर्गिक गुहेत दर्याबाई आणि वेल्हाबाई ह्या दोन देवींची मंदिरे आहेत. काही पायर्‍या उतरून दरीत उतरावे लागते. भोवताली उंच कातळ, समोर कातळातलाच नैसर्गिक ओढा, हिरवागार, शांत परिसर, माकडेही भरपूर. वडगाव दर्याचे आश्चर्य ह्या दोन मंदिरांत आहे. ही दोन्ही मंदिरे आतूनच एकमेकांना जोडलेली आहेत. मंदिरे म्हणण्यापेक्षा गुहा सयुक्तिक ठरावे. गुहांमध्येच देवतांची स्थापना केलेली आहे. दोन्ही गुहांत वरच्या छतातून अखंड पाणी टपटपत असते. ह्या शेकडो हजारो वर्षांच्या नैसर्गिक क्रियेने तयार होतात ते लवणस्तंभ.
इथल्या ठिसूळ खडकात चुनखडीचे प्रमाण फार. त्यांच्या संपर्कात कातळात झिरपलेले पाणी येते. हे पाणी हवेतील कर्बद्विप्रणील वायु मिसळल्यामुळे आम्लधर्मी बनते. अशा पाण्यात चुनखडी पटकन विरघळते त्यामुळे खडकात पोकळी तयार होते व हळूहळू चुनखडीयुक्त पाणी अर्थात क्षार किंवा लवण छतांवरील छिद्रांतून बाहेर यायला लागते. पाण्याच्या थेंबात क्षारांचे प्रमाण खूप जास्त असल्यास तेथे क्षार धरून ठेवण्याची पाण्याची क्षमता संपते व हे कण हळूहळू छताला चिकटायला लागतात व लोंंबकळल्यासारखे दिसतात त्याला अधोमुखी लवणस्तंभ अथवा स्टॅलाक्‍टाईट म्हणतात. हेच थेंब खाली जमिनीवर पडून तिथेही क्षारांचे स्तंभ तयार व्हायला लागतात हे खालून वर असे जाणारे असल्यामुळे त्यांना उर्ध्वमुखी लवणस्तंभ अर्थात स्टॅलाग्माईट असे म्हणतात. हे दोन्ही प्रकारचे स्तंभ वडगाव दर्या येथे आहेत. ह्यापूर्वी मी अधोमुखी लवणस्तंभ पाटेश्वर येथील वर्‍हाडघर लेणीसमूहात पाहिले होते. येथे मात्र दोन्ही प्रकार पाहता आले.








वडगाव दर्याचे लवणस्तंभ :-
       अहिल्यानगर, पुणे जिल्ह्यांमधे पसरलेला  ओसाड, रखरखीत, बोडका प्रदेश,म्हणजे कान्हूरपठार ! कान्हूर पठार हे नगर जिल्ह्यातील सर्वांत मोठं, सर्वांत उंचावर (९७० मीटर्स) असणारं पठार आहे, असे तेथील लोक सांगतात. हा सारा भाग चुनखडीने समृद्ध आहे. फारशा खोल नसलेल्या भरपूर दर्‍याखोर्‍यांनी व्यापलेला हा पठारी भाग आहे. इथल्या विशिष्ट भूरचनेमुळे त्याहीपेक्षा निसर्गाच्या किमयेने इथे भूरूपांच्या  निघोजची रांजणकुंडे, गुळूंचवाडीचा नैसर्गिक शिलासेतू, वडगाव दर्याचे लवणस्तंभ अशी नैसर्गिक आश्चर्य बघायला मिळतात. 
  निघोजहून निघाल्यावर घाट संपला की, एकाच ठिकाणी दोन रस्ते डावीकडे फुटतात. त्यांतील डाव्या रस्त्याने गेलं की वडगावदर्या गाव गाठता येतं. मात्र रस्त्यांच्या दिशा व स्थानं दाखविणारे फलक नावापुरतेच राहिले आहेत. वडगाव दर्या नावाले अगदी साजेसे. एका खोलवर दरीत हे वसले आहे. कातळातील नैसर्गिक गुहेत दर्याबाई आणि वेल्हाबाई ह्या दोन देवींची मंदिरे आहेत. काही पायर्‍या उतरून दरीत उतरावे लागते. भोवताली उंच कातळ, समोर कातळातलाच नैसर्गिक ओढा, हिरवागार, शांत परिसर, माकडेही भरपूर. वडगाव दर्याचे आश्चर्य ह्या दोन मंदिरांत आहे. ही दोन्ही मंदिरे आतूनच एकमेकांना जोडलेली आहेत. मंदिरे म्हणण्यापेक्षा गुहा सयुक्तिक ठरावे. गुहांमध्येच देवतांची स्थापना केलेली आहे. दोन्ही गुहांत वरच्या छतातून अखंड पाणी  झिरपत असते. ह्या शेकडो हजारो वर्षांच्या नैसर्गिक क्रियेने तयार होतात ते लवणस्तंभ.
इथल्या ठिसूळ खडकात चुनखडीचे प्रमाण फार. त्यांच्या संपर्कात कातळात झिरपलेले पाणी येते. हे पाणी हवेतील कार्बन डाउ ऑक्साईड वायु मिसळल्यामुळे आम्लधर्मी ( कार्बोनिक अ‍ॅसिड ) बनते. अशा पाण्यात चुनखडी पटकन विरघळते त्यामुळे खडकात पोकळी तयार होते व हळूहळू चुनखडीयुक्त पाणी अर्थात क्षार किंवा लवण छतांवरील छिद्रांतून बाहेर यायला लागते. पाण्याच्या थेंबात क्षारांचे प्रमाण खूप जास्त असल्यास तेथे क्षार धरून ठेवण्याची पाण्याची क्षमता संपते व हे कण हळूहळू छताला चिकटायला लागतात व लोंंबकळल्यासारखे दिसतात त्याला अधोमुखी लवणस्तंभ अथवा स्टॅलाक्‍टाईट म्हणतात. हेच थेंब खाली जमिनीवर पडून तिथेही क्षारांचे स्तंभ तयार व्हायला लागतात हे खालून वर असे जाणारे असल्यामुळे त्यांना उर्ध्वमुखी लवणस्तंभ अर्थात स्टॅलाग्माईट असे म्हणतात. हे दोन्ही प्रकारचे स्तंभ वडगाव दर्या येथे आहेत. अधोमुखी लवणस्तंभ पाटेश्वर येथील वर्‍हाडघर लेणी समूहात, फलटण जवळच्या संतोषगडाव्र, मुरुड जवळच्या पद्मदुर्ग इथेही पाहायला मिळतात.  येथे मात्र दोन्ही प्रकार पाहता आले.
दर्याबाईचं मंदिर, खालचा ओढा, तेथील गुहा या भागात माकडं भरपूर आहेत. त्यामुळे खाद्यपदार्थ तेथे बसून खाणं अशक्यच बनतं. येणाऱ्या पर्यटकांनी ही लवणस्तंभं किंवा कांड्या यांची नासधूस करू नये. कारण एक सेंटीमीटर लांबीची लवणकांडी तयार व्हायला अनेक वर्ष लागतात.






 

WhatsApp group link:
==================================
🐢 *Mini Turtles Are Back! Witness the Magic at VELAS TURTLE FESTIVAL!* 🐢
*SHRIRAM Treks and Tours presents a once-in-a-lifetime experience!*

🌊 *Batch Date:*
March : 22 , 26, 28, 29,31
April : 3,4,5,11,12,14
🚌 *Departure:* 9:30pm from Pune ,Pcmc,Mumbai
====================================
Fees:
Pune -1699/- per person ; (kids -1199/-5yr to 10yr)
Mumbai-2199/- per person (kids -1499/-5yr to 10yr)
======================================
Contact :
Pune-9604832547
Mumbai-7030822044







भैरवगड, वसंतगड अभ्यास सहल ( १२ एप्रिल २०२६ ) :-
उन्हाचा कडाका वाढत आहे, तसेच शाळा, कॉलेजना सुट्ट्या सुरु झाल्या आहेत, हा वेळ सत्कारणी लावण्यासाठी आपण जाणार आहोत कोयनेच्या घनदाट अरण्यात ! यावेळी आपल्याला भेट द्यायची आहे गर्द राईतील फारश्या माहिती नसणार्या भैरवगडाला. सात वाघांचा वावर असणार्या जंगलाच्या बफर झोनमध्ये ओपन जीप राईडचा आनंद, वन्य प्राणी दर्शन, अरण्यात वसलेले भैरवनाथाचे मंदीर आणि फक्त २५ मिनीटांचा भैरवगडाचा ट्रेक याचा अनुभव घेण्यासाठी या ट्रेकला जरुर या.
तसेच छत्रपती घराण्याशी संबधीत तळबीड गाव, हंबीरराव मोहीतेंची समाधी, निसर्गरम्य , एतिहासिक कथा असणारा वसंतगड आपल्याला बघायचा आहे.
*काही महत्वपूर्ण बाबी*
🌸 दोन्ही गडावर फारशी चढाई नाही त्यामुळे कोणत्याही वयाची व्यक्ती ट्रेकला येउ शकते.
🌸 कोयनेच्या घनदाट जंगलाचा अनुभव व या परिसराचा इतिहास आपण जाणून घेणार आहोत.
सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात वाघाचे अस्तित्व जाणवल्यामुळे भैरवगडावर जाण्यासाठी वनखात्याची परवानगी मिळेल याची खात्री नसते. त्यामुळे बाजी, सुभेदार, हिरकणी अश्या वाघांच्या वावराच्या परिसरात बफर झोनमध्ये ओपन जीपने प्रवास करण्याची संधी.
⛳ आयोजक :- "किल्ले आणि इतिहास परिवार..."
🚩 दिनांक :- १२ एप्रिल २०२६ (रविवार) एक दिवसीय अभ्यास सहल.
दि. ११ एप्रिल रोजी रात्री १२ वाजता पुण्यातून निघून पहाटे कोयनानगरला पोहचून नाष्टा करुन वनखात्याची परवानगी घेउन भैरवगड बघायचा आहे. बारा वाजेपर्यंत भैरवगड बघून शाकाहारी जेवण करुन वेळ उपलब्ध असल्यास कराडजवळ्च्या वसंतगडाला भेट द्यायची आणि संध्याकाळी आठ वाजेपर्यंत पुण्याला परत यायचे आहे.
(प्रवेश निश्चिती शुक्रवार १० एप्रिल संध्याकाळीपर्यंत )
🌸 अभ्यास सहल शुल्क :-
₹. २००० /- ( दोन हजार रुपये फक्त) प्रतिव्यक्ती
ट्रेकच्या खर्चात समाविष्ट गोष्टी
१) पुणे ते पुणे नॉन ए.सी. बस प्रवास
२) नाष्टा,सकाळचा चहा, जेवण, वन खात्याची परवानगी, भैरवगडापर्यंत ओपन रुफ जीप, संध्याकाळचा चहा
३) तज्ज्ञ मार्गदर्शन
( सातारा, सांगली, कोल्हापुर, सोलापुर परिसरातील इच्छुक सातारा, उंब्रजमधून देखील ट्रेक जॉईन करु शकतात.
🚌 मर्यादित जागा असल्याने आपला प्रवेश त्वरित निश्चित करा...
ज्यांना खरोखरच मोहिमेला यायचे आहे, फक्त त्यांनीच ग्रुप जॉईन करावा. टाईमपाससाठी आलेल्यांना मोहीमेच्या तातडीने रिमुव्ह करण्यात येईल.
कृपया मोठ्या संख्येने या अभ्यासमोहीमेत सामिल व्हावे हि विनंती.
नाव नोंदणी संपर्क :-
श्री. स्वप्निल जिरगे
मोबाईल-
Follow this link to join my WhatsApp group:



Bhairavagad ( Koyna Nagar ) , Dategad One day Trek: 13 April 2025

Forts and History group announces a one day study tour of Bhairavagad ( Sahyadri Tiger Reservoir, Koyana) Fort Dategad near Patan, Dist.- Satara )
Total distance from Pune- 410 K.m.
Difficulty Level- Easy
We will start from Pune by 12.00 am on Saturday 12 April 2025 and reach Koyna Nagar in morning, after tea and breakfast will start for Bhairavgad. Fort is located in wildlife sanctuary. So after having permission from Forest Department, we will visit and explore fort . After taking lunch at 12.00 p.m. we will visit Fort Dategad near Patan city. We will start our return journey at 4.00 p.m. and will reach Pune by 8.00 p.m.
Inclusions :-
1) Travel by a private non-AC bus.
2) Breakfast, Lunch & High Tea
3) Adventure Experts & Leaders
4) First aid kit.
5) Personal Entry, Toll & Parking etc
6) Forest Department entry fee
Importanat:-
• Sayhadri wild life sanctuary is about to reserve for Tiger safari, so in future entry in this region might restricted. So grab the opportunity to visit Bhairavgad fort.
• Climb on both the fort is of easy level. So any fit person can attend the trek.
Trek Fees- 2000/- ( Two thousand only ) per person. No hidden cost
Contact:-
Swapnil Jirage
9960022621

Follow the link to join the group





काराडचे शिलाहार 🚩

मनसर

 प्रकार : गिरीदुर्ग जिल्हा : नागपुर उंची : १२०० फुट ...