Wednesday, February 11, 2026

नाशिक (नासिक)

 नाशिक शहराची निर्मीती व ऐतिहासिक महत्त्व :-
          नाशिक हे महाराष्ट्रातील एक महत्त्वाचे शहर असून, त्याला ऐतिहासिक, धार्मिक, सांस्कृतिक, आणि आर्थिक दृष्टिकोनातून मोठे स्थान आहे. गोदावरी नदीच्या काठावर वसलेले हे शहर त्याच्या पुरातन वारशासाठी, कुम्भमेळ्यासाठी आणि आधुनिक औद्योगिक विकासासाठी प्रसिद्ध आहे. नाशिकच्या इतिहासाचा मागोवा घेतल्यास आपल्याला त्याचे महत्त्व पुरातन काळापासून ते आधुनिक काळापर्यंत सतत वाढत गेले असल्याचे दिसते. ‘नासिक’ शहर हे भारतातील महत्त्वाच्या तीर्थक्षेत्रांपैकी एक आहे. दक्षिणेकडील गंगा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ‘गोदावरी नदी’चा उगम हा त्र्यंबक गावाला लागून असलेल्या ‘ब्रह्मगिरी’ पर्वतावर होतो. ‘नासिक’ शहरात शिरताना गोदावरी नदीचे पात्र फार विस्तारलेले दिसते.  भारतातल्या चार कुंभमेळ्यांपैकी सिंहस्थ कुंभमेळ्याचे क्षेत्र नाशिक आहे. दर १२ वर्षांनी येथे कुंभमेळा भरतो. येथील मंदिरे व गोदावरी नदीवरील घाट प्रसिद्ध आहेत. इ.स. १२०० सालाच्या सुमारास खोदलेली त्रिरश्मी लेणी आहेत. 


          नाशिकचा इतिहास रामायण काळाशी जोडलेला आहे. भगवान राम, माता सीता, आणि लक्ष्मण यांनी अयोध्येहून वनवासात येऊन नाशिकमध्ये पंचवटी या ठिकाणी वास्तव्य केले होते, अशी मान्यता आहे. वैदीक परंपरेनुसार अगस्त्य ऋषी भगवान श्रीरामांना नाशिक येथील आश्रमात भेटले. त्यांनी श्रीरामांना या परिसरात वनवासाचा काळ घालवण्यचा सल्ला दिला. रामायणात जनस्थान किंवा नाशिकचे वर्णन फळे आणि फुलांच्या झाडांनी समृद्ध, वन्य प्राणी आणि पक्ष्यांनी भरलेले आणि राक्षसांच्या जमातींनी वसलेले वनक्षेत्र म्हणून केले आहे. शहराच्या नावाचा उगम रामायण या महाकाव्याशी जोडला जातो. या महाकाव्यानुसार लक्ष्मणाने रावणाची बहीण शूर्पणखा हिचे नाक कापले होते, त्यामुळे या जागेचे किंवा या गावाचे नाव 'नाशिक' असे पडले आहे. तसेच महाराष्ट्र सरकारने ते बदलून नाशिक केले आहे.नाशिक आणि पंचवटी या दोन भागांतून जी गोदावरी नदी वाहते ती नऊ टेकड्यांच्या मधून वाहते म्हणनु त्यास "नव शिखां"असे म्हणतात.शिखा या संस्कृत शब्दाचा अर्थ टेकडी असा होतो. त्यावरून 'नव शिखा' नगरी वरून नाशिक असे नाव झाले.  त्या नऊ टेकड्या नासिक शहरात पाहण्यास मिळतात – १. जुनी गढी, . नवी गढी, ३. जोगवाडा टेक, ४. पठाणपुरा टेक, ५. म्हसरूळ टेक, ६. डिंगरआळी टेक, ७. सोनार अळी टेक, ८. गणपती डोंगर, ९. चित्रघंटा टेक.
  कृतेत पद्मनगरं त्रेतयांतू त्रिकंटकं |
द्वापारातु जनस्थान कलौ नासिक मुच्यते |
कशी पुरी च केदारी महाकलोथ नासिकम् |
त्र्यंबकं च महाक्षेत्रंपंचदीपा इमे भुवि |
          हा श्लोक पद्मपुराणातील असून प्रत्येक युगातील ‘नासिक’च्या नावाची माहिती त्यामध्ये मिळते. म्हणजेच पद्मपुराण जेव्हा लिहिले गेले त्याच्या पूर्वीपासूनच ‘नासिक’ हा उल्लेख सापडतो.
         पुरातन काळापासून नाशिक शहर व त्या आसपासचा परिसर विविध नावांनी ओळखला जात असे. प्राचीन काळामध्ये ‘नासिक’ शहराचे उल्लेख हे नासिक्य, जनस्थान, त्रिकंटक; तसेच, पद्मनगर असेदेखील आढळून येतात. रामायणामध्ये आलेल्या उल्लेखानुसार दंडकारण्यातील ‘जनस्थान’ म्हणजेच ‘नासिक’. ‘नासिक’मधील ‘पंचवटी’ म्हणजे पाच ऋषिकुमारांचे प्रतीक असून ते शापित ऋषिकुमार प्रभू रामांच्या स्पर्शाने मुक्त झाले असे मानले जाते. राम, लक्ष्मण, सीता गोदावरीच्या तीरावर जनस्थानामध्ये पंचवटी येथे पर्णकुटी बांधून राहिले होते, ते ठिकाण म्हणजेच ‘नासिक’.
 महाकवी कालिदास व भवभूती यांनी त्यांच्या लेखनात नाशिकबद्दल आदराचे उद्गार काढले आहेत. पतंजली याच्या ‘महाभाष्य’ या ग्रंथात ‘नासिक’चा उल्लेख येतो. जैन परंपरेनुसार जैनांचे आठवे तीर्थंकर ‘चंद्रप्रभ’ यांनी ‘नासिक’ येथे कुंतिविहार नावाचे मंदिर बांधले. ती नोंद इसवी सन चौदाव्या शतकातील जीन प्रभुसूरींच्या ‘विविधतीर्थकल्प’ या ग्रंथामध्ये मिळते.
महानुभाव पंथाचे संस्थापक ‘चक्रधर स्वामी’ नासिकमध्ये काही काळ फिरल्याचे संदर्भ हे त्यांच्या ‘स्थानपोथी’ या ग्रंथात मिळतात. चक्रधर स्वामी हे नासिक येथे पंचवटी येथे वास्तव्यास होते. त्यांनी रामनाथ, महालक्ष्मी, विनायक आदित्य, कपालेश्वर या ठिकाणी त्या काळात भेटी दिल्या असे उल्लेख आहेत. नंतर ते गोवर्धन, त्र्यंबक, अंजनेरी, या ठिकाणी गेले आणि परत ‘नासिक’ येथे आले आणि ते ‘नासिक’मधून बीड येथे निघाले.मोगल साम्राज्याच्या काळात नाशिक 'गुलाबांचे शहर' म्हणून 'गुलशनाबाद' या नावाने ज्ञात होते. नासिकच्या परिसरातील डोंगर हा सह्याद्रीच्या नासिकासदृश आहे म्हणूनही नासिक हे नाव पडले असावे, अशी दाट शक्यता आहे.
   बागलानमधून गुजरात आणि कोकणच्या किनार्याकडे जाणारे जुने व्यापारी मार्ग नाशिकमधून जात होते. नाशिकचे सुरवातीचे शासक प्रतिष्ठाण ( पैठण ) आणि तगर ( तेर ) याच्या नियंत्रणात होते. त्यावेळी या शासकांची राजधानी कदाचित अंजनेरी, साल्हेर किंवा चांदोर येथे असावे. इ.स. पुर्व २५० काळातील व्यापार्यांची इथे जा ये होती. तगर या शहराच्या स्थानाविषयी त्या काळातील भारताला भेट दिलेल्या प्रवाशाच्या लिखाणात मतभिन्नता आढळते. सुरवातीला जुन्नर हेच तगर असावे असे मत बॉम, रॉय यांनी मांडले. 

टॉलेमीने बनवलेला जगाचा नकाशा
 टॉलेमीने बनवलेला अशिया खंडाचा नकाशा
 
मात्र इ.स.१५० च्या आसपास या प्रदेशाला भेट दिलेल्या टॉलेमी तसेच इ.स. २४७ च्या वेळी भेट दिलेल्या अज्ञात प्रवाश्याने लिहीलेल्या पेरिप्लस या दोघानी तगर हे पैठणच्या ( त्यावेळच्या प्रतिष्ठाणच्या ) पुर्वेस आहे असे मत मांडले. पेरिप्लस या ग्रंथातील उल्लेखानुसार भडोच बंदरात उतरलेला माल बर्याच गाड्यात लादून तगरला नेला जात असे. यावरून कदाचित तगर हे अरबी समुद्रातून बंगालच्या उपसागराकडे जाणार्या व्यापारी मार्गावर वसलेले असावे असा अंदाज केला जातो. हा व्यापारी मार्ग पुर्वेकडे कल्याण, मालखेट, बिदर, गोवळकोंडा, भागानगर ( सध्याचे हैद्राबाद ) यामार्गे मच्छलीपट्टणला जातो. त्याकाळचे प्रतिष्ठाण म्हणजे पैठण हे तात्कालीन सातवाहन राजांची राजधानी होती.
    सुरवातीच्या काळात मगधच्या मौर्य साम्र्ज्याचे राज्य नाशिक येथे असावे. पुढे मुळचे आंध्र प्रदेशातील असावे असा तर्क केल्या जाणार्या आंध्रभृत्य राजांचे नाशिक येथे राज्य असावे. आंध्रभृत्यांच्या आधी शृंग आणि कण्व वंधाचे राज्य होते. ‘नासिक’ शहराचा जो प्राचीन इतिहास उपलब्ध आहे त्यामध्ये इसवी सनपूर्व दुसऱ्या शतकाच्या सुरुवातीस महाराष्ट्रात ‘सातवाहनां’ची सत्ता उदयास आली. सातवाहन साम्राज्याची राजधानी धेनुकाकट होती, काही तज्ज्ञांच्या मते हे डहाणु असावे किंवा गुंटूरजवळ असलेले धरणीकोट असावे.  त्याच्याही आधी ‘नासिक’ हे शहर संपूर्ण भारतात माहीत होते. नासिकचा उल्लेख हा ‘नासिक्य’ असा इसवी सनपूर्व पाचव्या-चौथ्या शतकात निर्माण झालेल्या वाङ्मयातून आलेला आहे. कौटिल्याने देखील ‘नासिक’चा उल्लेख हा ‘नासिक्य’ असाच केलेला आहे. कात्यायनाच्या ‘वृत्तिकांत’ या ग्रंथात इसवी सनपूर्व २५० मध्ये ‘नासिक्य’ हाच उल्लेख येतो.
नासिक आणि बौद्ध धर्म यांचा संबंध हा प्राचीन काळापासून दिसून येतो. ‘महामायुरी’ या महत्त्वाच्या ग्रंथात ‘नासिक’ येथे सुंदरयक्ष(सुंदर तरुण देवता) असल्याचा उल्लेख मिळतो. त्याच कालखंडामध्ये ‘नासिक’ येथे संपूर्ण नासिकमध्ये प्रसिद्ध असलेली ‘त्रिरष्मी लेणी’ कोरली गेली. तिला लोक ‘पांडव लेणी’ संबोधतात. प्रसिद्ध खगोलतत्त्ववेत्ता टॉलेमी याने इसवी सन १५० मध्ये ‘नासिक’ शहराची नोंद ही ‘धर्मपीठ’ म्हणून केलेली आहे. सातवाहनांचे राजवट इ.स. पहिल्या शतकापर्यंत टिकली. मात्र शक वंशाच्या शहरत राजघराण्यातील नहपानाने नाशिकवर हल्ला करुन सातवाहनांची राजवट संपुष्टात आली. या नहपानाचे शिलालेख नाशिक, कार्ला, जुन्नर येथील लेण्यात उल्लेख आहेत. शक हे मुळचे पर्थियम प्रदेशातील होते.  नहपान, जरी मूळतः उत्तरेकडील कुषाण राजवटीच्या अधीन होता, तरी त्याने दक्षिण भुभाग जिंकल्यानंतर स्वतःला स्वतंत्र केले आणि माळव्यात आपले मुख्यालय स्थापन केले असे दिसते. [त्याची राजधानी उजैनच्या दक्षिणेस एक शहर असल्याचे दिसते, ज्याचा उल्लेख टॉलेमीने मीनागरा म्हणून केला आहे परंतु त्याची ओळख पटलेली नाही. नहपानाचे बरेच अधिकारी बौध्द होते. नहपानाच्या कन्येचा विवाह ऋषभदत्त या हिंदु राजाशी करुन त्यांनी सातवाहन घराण्याशी संबंध प्रस्थापित केले ते याच नाशिक परिसरात !
   पैठण येथे असलेल्या बुध्दधर्मीय लोकांनी इ.स.पुर्व दुसर्या शताकात नाशिक शहराच्या नैऋत्येला असलेली त्रिरश्मी लेणी कोरली. याच नाशिक येथील एका यात्रेकरुने इ.स. पुर्व २५० ते २०० या काळात कोरलेल्या भारहुत लेण्यातील एक स्तंभ कोरण्यासाठी दान दिल्याचा उल्लेख आहे. त्यात "नाशिक येथील वसुक याची पत्नी गोरक्षित हिने देणगी दाखल बांधला'.असा उल्लेख आहे. पांडवलेण्याच्या २० क्रमांकाच्या लेण्यातील शिलालेखात नाशिकचा स्पष्ट उल्लेख आहे. 
             'नासिककानां धांभिकं ग्रामस्य दानं'
हे लेणे इ.स. पुर्व ५० च्या सुमाराला कोरले आहे. त्यानंतर २२ क्रमांकाच्या लेण्यात खालील शिलालेख आहे.
         ' शालिवाहन कुले कृष्णे राजानि  नासिककेन
            श्रमणेन महामात्येन लयनं कारितं'

"When Krishna of Shaliwahan family was king, this cave was made by the great shramana minister an inhabitant of Nashik"
हे ही लेण इ.स.पुर्व ५० या कालात तयार झालेले आहे.म्हणजे दोन हजार वर्षापुर्वी खोदले आहे. पांडव लेण्यातील लेणे क्रमांक ३ इ.स. पुर्व ५ ते १७ या काळात तयार झाले.

 नाशिकच्या गुहेतील शिलालेखांवरून असे दिसून येते की नहपनची मुलगी आणि तिचा पती उषावदत यांनी ब्राह्मण आणि बौद्ध दोघांनाही दान दिले होते. या लेण्यातील शिलालेखात राजमाता गौतमी हिचे वर्णन आहे. त्या शिलालेखाचे इंग्रजी अनुवाद असा.
     "Meritorious gift by the queen Gautami a lover of truth charity forbearance and respect for life, eagerly engaged in penance , self -control , mortification and fasts , fully bearing , out of the title "wife of Royal sage"mother of the illustrous Satkarni Gautamiputra ( son of Gautami ) king of kings -whose army have drunk the water of three oceans, whose hand is fearless and wet by the water held in 



 The Nashik Caves contain an inscription recording generous patronage for Buddhist and Jain monks, reflecting the region’s strong Buddhist influence and suggesting that early Hindu rulers of Nashik may have supported Buddhism.
उषावदत शिलालेखांपैकी एक असे सांगतो की त्याने बिरणास्य (पालनपूरमधील बनास) वर पायऱ्या बांधल्या, देवांना आणि ब्राह्मणांना सोळा गावे दिली, दरवर्षी १००,००० ब्राह्मणांना अन्न दिले, प्रभास येथे ब्राह्मणांना स्त्रीया दान दिल्या, याच उषावदात ( ऋषभदत्तने ) भडोच, दशपुर ( माळवा, मध्ये प्रदेश ) गोवर्धन ( नाशिक ) शुर्पारक ( नालासोपारा ) याठिकाणी बांधकाम केली. याच राजाच्या काळात ईबा ( अंबिका ), पार्डा ( पार ) दमण ( दमणगंगा नदी ) आणि डहाणुका ( सध्याचे डहाणु ), ताप्ती ( तापी ) येथे बंदराची उभारणी केली. तसेच करबेनाचा उल्लेखही आहे, जी कदाचित कावेरीची उपनदी असावी. याच ठिकाणी अनहिलवाडच्या अंबुड राजाने कालवेनी नदीवर पुल बांधून उत्तर कोकणचा शिलाहार राजा मल्लिकार्जून यावर स्वारी करुन त्याला हरवले.
        यावेळी नाशिक किंवा गोवर्धन हे मोठ्या विणकाम उद्योगासह काही व्यापाराचे ठिकाण होते. कदाचित मार्को पोलो (१२९०) यांना बगदाद येथे आढळलेले  नासिच आणि नाक नावाचे रेशीम विणकामाचे साहित्य आणि सोन्याचे धागे मूळतः नाशिकहून आले असावे. चौदाव्या शतकात हे रेशीम युरोपमध्ये नाक, नॅक, नाचिस, नासीझ आणि नासिस म्हणून ओळखले जात होते. क्षत्रप राजांनी नाशिकवर (सुमारे इ.स. १२४ किंवा ३१९ पर्यंत) ताबा मिळवला होता असे दिसते. गौतमीपुत्र सातकर्णीने आंध्रभृत्यांचे पुनर्वसन केले आणि शक, यवन आणि पल्लवांचा नाश करणारा ही पदवी मिळवली. गौतमीपुत्राची नाशिक परिसरातील कारकीर्द इ.स. ३१९ पर्यंत असेल असे गृहित धरले तर नाशिकमध्ये क्षत्रप राजवटीचा कालावधी सुमारे १४० वर्षांपर्यंत वाढतो. लेण्यांमधील शिलालेख आणि लेण्यांमध्ये मिळालेले दागिने यांचा पुरावा म्हणून विचार केला तर हे दावे परस्परविरोधी वाटतात. नहपनचा जावई उषावदत याने वापरलेली शिलालेखासाठी वापरलेली वर्णमाला गौतमीपुत्राने वापरलेल्या वर्णमालापेक्षा थोडी वेगळी आहे.  त्याच वेळी, त्रिरश्मी लेण्यातील नहापाने कोरुन घेतलेल्या गुहेतील (क्रमांक आठवा) स्तंभांची शीर्ष गौतमीपुत्राच्या गुहेच्या (क्रमांक तिसरा) व्हरांड्यातील स्तंभ शिखरांपेक्षा खूपच चांगल्या शैलीत कोरलेले आहेत, त्यामुळे गौतमीपुत्रांच्या काळात कोरलेल्या लेण्यापेक्षा नहपानाच्या गुंफा खूप नंतरच्या काळातील असल्याचे दिसते, जरी शैलीतील फरक कदाचित नहापनच्या उत्तरेकडील वास्तुविशारदाच्या कौशल्यामुळे असावा. गौतमीपुत्राचा मुलगा आणि उत्तराधिकारी पैठणचा अधिपती श्री पुलिमत, पुलोमावित किंवा पुदुमयी याच्यामुळे नाशिकवरील क्षत्रप राजवट चाळीस वर्षांपेक्षा जास्त काळ टिकली नाही. याचा उल्लेख टॉलेमीने सिरी पोलमिक्स म्हणून केला आहे.
 गौतमीपुत्रांनी भारताच्या वायव्य सीमेपासून सध्याच्या बिदरपर्यंत पसरलेल्या आसिक, अश्मक, मुधक, सुराष्ट्र, कुकुर, अपरांत, विदर्भ, अनुप, अकार आणि अवंती या प्रदेशांवर राज्य केले. [काही अभ्यासकांच्या मते पहिली तीन नावे असिक, सुसक आणि मुलक किंवा मुंडक अशी आहेत आणि त्यांना वायव्य सीमेवरील स्कायथियन जमाती, अर्शक किंवा पार्थियन, सुस आणि मुंड असे समजतात.सुराष्ट्र हे सोरठ किंवा काठियावाड आहे, कुकुर हा पंजाबमधील प्रदेश आहे अपरांत म्हणजे कोकण ] गौतमीपुत्राचा मुलगा श्री पुलुमयी, जो बौद्धां धर्मींयासाठी न्यायी आणि उदार होता असे म्हटले जाते, त्याचे गोवर्धन किंवा नाशिकजवळील नवनार नावाचे ठिकाण हि राजधानी होती.जबलपूरच्या पूर्वेस सुमारे सत्तर मैलांवर अनुपपूर आणि त्याच्या उध्वस्त मंदिरांमध्ये अनुप प्रदेशाचा एक ठसा शिल्लक असल्याचे दिसते. अकार आणि अवंती मिळून आधुनिक माळवा तयार होतो.] दुसऱ्या शतकाच्या अखेरीस (इ.स. १७८ ), गुजरातमधील क्षत्रपांपैकी तिसरा किंवा चौथा रुद्रदमन ( याचीच अधिक शक्यता ) याने सातवाहानांची सत्ता मर्यादीत केली. त्याने नाशिक ताब्यात घेतलेले किंवा दख्खनचा कोणताही भाग जिंकलेला दिसत नाही.  गुजरातमध्ये क्षत्रप सत्ता इ.स. २५० पर्यंत, म्हणजेच शक काळाच्या आधारे, इ.स. ३२८ पर्यंत टिकली . गिरनार शिलालेखात, रुद्रदस्मन (१७८) म्हणतात की जरी त्याने सातकर्णीवर दोनदा विजय मिळवला, तरी त्यांच्या जवळच्या नातेसंबंधामुळे त्याने त्याचा नाश केला नाही. विष्णु पुराणानुसार, पुनर्स्थापित झालेल्या आंध्रभृत्यांनी गौतमीपुत्राच्या कारकिर्दीच्या समाप्तीनंतर, म्हणजेच सातवाहन राजवंशाच्या कारकीर्दीच्या सुरुवातीचा कालखंडापासून सुमारे इ.स. २२० किंवा इ.स. ४१४ पर्यंत पंच्याण्णव वर्षे राज्य केले. गोवर्धन हे त्यांची राजधानी होती. 

 
( नाशिक येथे नाणी (१८७०) सापडली आहेत जी इसवी सनाच्या चौथ्या शतकाच्या अखेरीस असल्याचे मानले जाते. नाण्यावरील राजाचे नाव मानस नृप असे वाचले गेले आहे, परंतु त्याच्याबद्दल काहीही माहिती नाही. )

 नाशिक परिसरात सापडलेले अभिरकालीन नाणे
 
अभिराक राजवंशाचा उदय (इ.स. २२० - इ.स. ३७७)
  यानंतर आहे पाचव्या शतकाचा सुरवातीचा टप्पा ! सातवाहन साम्राज्याच्या पतनानंतर, अभिराक राजवंश सत्तेवर आला. पाचव्या शतकाच्या सुरुवातीला (इ.स. ४१६) नाशिक परिसरात अभिर किंवा अहिर जमातीची सत्ता असल्याचे दिसून येते, शिवदत्तचा मुलगा राजा ईश्वरसेन हा अभिरा राजवंशाचा संस्थापक होता. मात्र यांची राजवट फक्त सत्तासत्तर वर्षे टिकली. त्यांची राजधानी त्र्यंबकच्या पाच मैल पूर्वेस अंजनेरी येथे असल्याचे मानले जाते. यावेळी गोवर्धन, किंवा नाशिक, विणकर, अभियंते आणि तेलवाले यांच्या उद्योगाचे एक महत्त्वाचे केंद्र होते. त्यावेळी बौद्ध धर्माची भरभराट होत होती, ज्याचे मुख्य अनुयायी अर्थातच कारागीर आणि कामगार होते. त्रिरश्मी लेणी किंवा नाशिकची कीर्ती बौध्द धर्मीयांचे स्थान म्हणून असल्याचा एक पुरावा आपल्याला त्रिरश्मी लेण्यातील एका गुंफेच्या निर्मितीत सापडतो.  या गुंफेची निर्मिती सिंधजवळील दत्तामित्री शहरात राहणाऱ्या यवन ( ग्रीक व्यक्ती ) इंद्रअग्निदत्त याने केली. त्रिरश्मी येथे पावसाळ्यात सर्व बाजूंनी भिक्षू पुजारी एकत्र येत असत.मात्र त्याच वेळी वैदीकधर्माकडे दुर्लक्ष केले जात नव्हते. उषावादितांने  ब्राह्मणांना जितके दिले तितकेच बौद्धांनाही दिले आणि बौद्ध शिलालेखांमध्ये ब्राह्मणांचा आदराने उल्लेख केला आहे.
     एकंदरीत इतिहासाचा हा टप्पा असा होता. इ.स.१०५-१०६ च्या दरम्यान नहपान या क्षत्रपाने सातवाहन राज्यकर्त्यांना हुसकावून लावले. इ.स १२४-१२५ च्या दरम्यान नहपानाचा पराभव करून त्याचा समूळ नाश केला.नहपानाच्या काळात गोवर्धन हे जिल्ह्याचे मुख्य ठिकाण होते. इ.स ४५-४६ च्या काळात शक-सातवाहन यांच्यात संघर्ष झाला. इ.स ८०-१२५ हा क्षत्रप वर्चस्वाचा कालखंड होता. त्याचप्रमाणे  इ.स.१२५-२०० हा कालखंड सातवाहनांचा होता. याच वेळेस आभीर राजवटीने वर्चस्व गाजवलेले दिसते. आभीर हे या प्रदेशातील गवळी होते. अंजनेरी ही त्यावेळची राजधानी होती. प्रारंभी ती क्षत्रपांची होती. इ.स. ३२१ ते ३८४ पर्यंत मौर्य साम्राज्याचे या भागावर वर्चस्व होते. त्यानंतर आभिरांच्या हाती सत्ता गेली. 

 नाशिक परिसरातील त्रैकुटककालीन नाणे
 
त्रैकुटक :-
  त्रैकुटक राजवंशाने त्यांचे नाव नाशिक जिल्ह्याच्या पश्चिमेकडील सीमेवरील त्रिकुट पर्वतावरून घेतले. नाशिक जिल्हा आणि गुजरातमध्ये सापडलेल्या शिलालेख आणि नाण्यांवरून ज्ञात असलेले तीन त्रैकुटक राजे इंद्रदत्त, दह्रसेन आणि व्याघ्रसेन आहेत. त्रिकुटांचा उल्लेख उत्तर कोकणातील कालिदास रघुवंशात आढळतो, जिथे ते स्थित आहेत.
विष्णुकुंड्य :-
   सहाव्या शतकात, जेव्हा वाकाटक राजवंश कमी होऊ लागला, तेव्हा विष्णुकुंड्यांचा राजा माधववर्मन पहिला याने विदर्भ प्रदेशावर कब्जा केला. माधववर्मन पहिला याने वाकाटक राजवंशातील शेवटच्या शासक हरिषेण पहिल्याच्या मुलीशी लग्न केले. त्याने वाकाटक राजवंशाच्या कमकुवतपणाचा फायदा घेत आपले राज्य दूरवर पसरवले. राजा माधववर्मन पहिला याने अनेक यज्ञ केले, ज्यात अकरा अश्वमेध यांचा समावेश होता. त्याच्या कारकिर्दीत, त्याने पश्चिम महाराष्ट्राचा प्रदेश आपल्या ताब्यात आणला.
कलचुरी (इ.स. ५५०-इ.स. ५७३)
        इ.स. ५५० मध्ये कलचुरी राजा कृष्णराजाने विष्णुकुंड्यांचा राजा महाराष्ट्र आणि विदर्भातून हाकलून लावला. राजा कृष्णराजाने पूर्वीच्या इंदूर राज्यातील महिष्मती, आधुनिक महेश्वर येथून राज्य केले होते. कृष्णराजाचा मुलगा शंकरगण याने गादीवर बसला; त्याने मालव्यापासून दक्षिणेकडील नाशिक आणि औरंगाबाद जिल्ह्यापर्यंत आपले राज्य वाढवले. शंकरगणानंतर त्याचा मुलगा बुद्धराज त्याच्या जागी आला. सिंहासनावर बसल्यानंतर बुद्धराज; राज्यारोहणानंतर लगेचच चालुक्य राजा मंगलेशाशी त्याच्या राज्याच्या दक्षिण सीमेवर झालेल्या संघर्षात सहभागी.
चालुक्य, ( इ.स. ५०० ) :-
पाचव्या शतकाच्या अखेरीस (४८०), हा प्रदेश अभिरांकडून चालुक्यांकडे गेला, गुजरातहून पुलकेशी ( प्रथम ) या राजाच्या नेतृत्वाखाली येऊन दक्षिणेकडचा भुभाग जिंकला आणि कर्नाटकामधील बदामीपर्यंत दक्षिणेकडे त्यांची सत्ता स्थापन केली. पूर्वी असे मानले जात होते की चालुक्यांची ही शाखा चौथ्या शतकात (३५४) दक्षिण भारतामध्ये स्थापन झाली होती आणि पाचव्या शतकात त्यांना उत्तरेकडे गुजरातकडे जावे लागले आणि (इ.स. ४७२) याच राजवटीच्या भरुच बंदर ताब्यात होते. परंतु श्री. फ्लीट यां तज्ज्ञाचे मत असे आहे की पाचव्या शतकात गुजरातमधील चालुक्य अजून दक्षिणेकडे जायचे होते आणि अजून पुलकेशी पहिला (४८९) यांच्या नेतृत्वाखाली त्यांनी दक्षिणेमध्ये प्रवेश केला नव्हता. त्याच्या आधी सातव्या शतकाच्या मध्यात (६५०) चालुक्य नागवर्धनने बालेग्राम हे गाव, जे सध्याचे  इगतपुरीच्या ईशान्येला सुमारे बारा मैल अंतरावर असलेले बेळगाव-तरल्हा आहे. हे गाव गोपराष्ट्र जिल्ह्यात असल्याचे वर्णन केले आहे,










श्री. लासेन यांच्या मतानुसार आठव्या शतकाच्या उत्तरार्धात नाशिक येथे यादवांचा उल्लेख आहे असे मानतात. परंतु त्यांनी वापरलेले संदर्भ विश्वसनीय नाहीत.
राठोड (  इ.स. ८००-९७० ) :-
   नाशिकमध्ये ज्या राजवंशाच्या अद्याप आहेत ,त्यात  राठोड राजवंश एक आहे. जिल्ह्याच्या उत्तरेकडील समृद्ध आणि संरक्षणाने सिध्द असा प्रदेश म्हणजे बागलाण, ज्यातून गुजरात आणि दक्षिणेमधील मुख्य व्यापारी मार्ग जातात, हा प्रदेश अगदी प्राचीन काळापासून राठोड कुटुंबाच्या ताब्यात होता असे दिसते. त्यांच्या मतानुसार ते कनौज राठोडांच्या वंशातील होते, राठोडांच्या दाव्यानुसार त्यांचे घराणे इ.स. ४७० च्या सुरुवातीला कनौज येथे होते, परंतु कनिंगहॅम या तज्ज्ञाच्या मतानुसार राठोडांनी सुमारे १०७० च्या आसपास कनौजवर विजय मिळवला असावा तर इ.स. ३०० पासून ते बागलाणमध्ये स्थायिक झाले होते. राष्ट्रकुट घराणे चौथ्या आणि पाचव्या शतकात दक्षिण भारताच्या या भागात स्थायिक झाले होते. राठोड घराण्याने सुरुवातीला स्वतंत्र सत्ता सांभाळली, स्वतःची नाणी पाडली. मात्र नंतर त्यांनी आपली सत्ता गमावली आणि गुजरातचा किंवा उत्तर दख्खनच्या परिसरातील बलवान अधिपतीला, कर दिला.



     मुसलमान सताधार्यांच्या सुरुवातीच्या काळात (इ.स. १३७०-१६००) बागलाणचे राठोडवंशीय राजे शक्तिशाली आणि जवळजवळ स्वतंत्र होते, प्रत्येक राठोड राजाने राजघराण्याचा उत्तराधिकारी म्हणून बहिर्जी ही पदवी धारण केली.पुढे मात्र राठोड राजे मोघलांचे मांडलीक झाले.  इ.स. १३७० मध्ये जेव्हा त्यानी दिल्लीला कर दिला ; १५२९ मध्ये  बहादुर शाहला १५७३ मध्ये जेव्हा त्यानी अकबराला कर दिला  पुढे इ.स. १७३७ मध्ये औरंगजेबाने त्यांच्यावर विजय मिळवला, तात्कालीन बागलाण प्रमुखाला बहिर्जी अशी पदवी होती. या पदवीचे नेमकी का घेतली जायची ते स्पष्ट होत नाही. परंतु कदाचित हि पदवी म्हणजेच बागलाण आणि कनौजचे राठोड यांच्यातील पारंपारिक संबंध सूचित करतात, बहुधा बहिर (जी) हे बौराह सारखेच असू शकते, हे कनौजच्या तत्कालीन  शासक घराण्याचे मुळ नाव होते.) राठोड राजे इ.स. १६४० मध्ये औरंगजेबला शरण गेले आणि त्यांनी त्याच्या दरबारात चांगले पद मिळवले, परंतु काही काळानंतरच, मराठे आणि मोगल यांच्यातील संघर्षात ते चिरडले गेले असे दिसते.
     या राठोड राजवंशातील वेगवेगळ्या शाखांमधील परस्पर संबंध पूर्णपणे स्पष्ट झालेला नाही. गुलबर्गापासून सुमारे तेवीस मैल आग्नेयेला असलेल्या मालखेड येथील राष्ट्रकुट किंवा रट्ट हे द्रविड वंशीय राजांनी विजय मिळवून उत्तरेकडील भुभाग ताब्यात घेतला किंवा कदाचित दुसरी शक्यता म्हणजे कनौजच्या राठोड ( इ.स. ४७०-११९३) सारखेच ते ही कदाचित उत्तरेकडील राजपूत वंशीय असावेत. नवव्या शतकातील दोन ताम्रपटातील उल्लेखानुसार राष्ट्रकुट राजे उत्तरेकडील होते आणि जेव्हा ते दक्षिणेकडे सरकले तेव्हा कदाचित त्यांची सर्वात प्रथम दक्षिणेकडील सत्ता बागलाणमध्ये होती या मताला पुष्टी मिळाली. नवव्या शतकाच्या सुरुवातीला, राजा गोविंद ( तिसरा ) ( इ.स. ७८५-८१०) यांनी उत्तर गुजरातपासून तुंगभद्रापर्यंत विजय मिळवला आणि आपल्या घराण्याला सत्तेवर आणले. मात्र मालखेड हे अद्याप त्यांची राजधानी नव्हती आणि गोविंदांने दिलेली दोन दानाचे उल्लेख दिंडोरीतील वणीजवळील मार्किंडा किंवा मयूरखंडी येथून मिळालेले आहेत, यावरून असा निष्कर्ष काढता येतो की हे घराणे बागलाणच्या राठोडांशी संबधित होते आणि राष्ट्रकूट सत्तेची सर्वात जुनी राजधानी नाशिकच्या उत्तर भागात होते.  मार्किंडा किंवा मयुरखंडी ही पूर्वीची राजधानी असल्याचे मानले जाते, परंतु डॉ. बुहलर आणि श्री. भगवानलाल यांना मते ते फक्त एक नगर होते. इ.स. ८०८ च्या दोन्ही दानपत्रात अंबक गावाचा ( सध्या या गावाचे नाव अंब आहे )  उल्लेख आहे, जे मयुरखंडीच्या दक्षिणेस दहा मैलांवर आहे. दानपत्रात ज्या अंबकचा उल्लेख आहे ते वन शहराच्या आत आणि नाशिकच्या देशात ( सध्याच्या जिल्ह्यात )आहे असा उल्लेख आहे. दानपत्रात अंब या गावाचे स्थान दर्शविण्यासाठी ज्या चार गावांचे उल्लेख आहेत, त्यापैकी पूर्वेकडील वडतूर जे सध्याचे वडनेर, दक्षिणेकडील वरीखेड असा उल्लेख असलेले सध्याचे वरखेड आणि पश्चिमे आहे असा उल्लेख केलेले पल्लीतावर हे गाव सध्याचे परमोरी असावे.मात्र उत्तरेकडे असलेले पद्मवल हे गाव कोणते ? हे अद्याप समजले नाही. दुसरे  दानपत्रात उल्लेख केलेल दुसरे ठिकाण आहे सध्याच्या अहिल्यानगर जिल्ह्यातील कर्जत परिसरातील रताजुन हे गाव. दानपत्रातील उल्लेख केल्या प्रमाणे इथे सिन्हा नदी म्हणजे सीना नदीच्या उजव्या तीरावर रताजुन आहे,त्याच्या दक्षिणेकडील वावुलाला हे गाव जे सध्याचे बाभूळगाव आहे आणि पश्चिमेकडील मिरियठाणा म्हणजे सध्याचे मिरजगाव आहे.मात्र उत्तरेकडील वडाहा हे  गाव अद्याप समजू शकले नाही. वनसाठी दानपत्र तसेच रासिन किंवा नगसाठी दानपत्र दिले आहे. मात्र नवव्या आणि दहाव्या शतकाच्या बहुते काळात मालखेडचे राष्ट्रकुट घराण्याने नाशिकच्या उत्तर भुभागात अधिपत्य गाजवले. इ.स. ९७० च्या सुमारास तैलप चालुक्य यांनी राष्ट्रकूटांचा पाडाव केल्यानंतर, नाशिक शहर आणि त्याच्या उत्तर परिसराचे अधिपत्य  गुजरातचे अनहिलवाडचे राजे आणि दक्षिणेकडील भुभागावर कल्याणीचे चालुक्य आणि कलचुरी यांच्या ताब्यात इ.स. ११८२ पर्यंत विभागले गेले आहे असे दिसते. अनहिलवाडा राजांच्या कालखंडात म्हणजे सुमारे इ.स. ९७० पासून त्यांच्या सत्तेच्या समाप्तीपर्यंत (इ.स. १२९५) त्यांच्या अधिपत्याखाली दक्षिण भारताचा उत्तरेकडील भुभाग होता. अनहिलवाडा राजांपैकी शेवटचा राजा करोन हा त्यावेळी बागलाणचा अधिपती होता.त्याचा पराभव इ.स. १२९७ मध्ये उलुघ खानाने केला. चालुक्य आणि अनहिलवाड घराण्याची हि राजवट पुढे देवगिरीचे यादव यांनी संपुष्टात आणून या प्रदेशावर राज्य केले. मात्र इ.स.१२९५ मध्ये मुसलमानांनी यादव राजांचा पाडाव केला. 

चांदवड  यादव (इ.स. ८५०-१०६० ) :-

      बागलाणच्या राठोड घराण्याव्यतिरिक्त, या परिसरात दोन राजवंशांच्या नोंदी आढळतात - चंद्रादित्यपूरचे यादव,( हे चंद्रादित्यपूर म्हणजे सध्याचे चांदवड  असावे) आणि सध्याच्या नाशिक जिल्ह्याच्या पूर्वेला असलेल्या चाळीसगावजवळील पाटणचे निकुंभ वंश. यापैकी चांदवड  घराणे जास्त महत्त्वाचे होते. ते कदाचित देवगिरी यादवांचे मूळ घराणे (इ.स. ११८२-१२९५) असावे, कारण दोन्ही घराण्यांना द्वारवती पूरवराधीश्वर, म्हणजेच द्वारकेचे अधिपती ही पदवी होती.या राजवंशाचा संस्थापक दृढप्रहार होता ज्याचा कालखंड इ.स. ८५० च्या आसपास आहे. यानेच चंद्रादित्यपूर या प्राचीन शहराची निर्मिती केली ( याचा कालखंड इ.स. ८५० हा इ.स. १०६९ ( शालीवाहन शक. ९९१) च्या ताम्रपटावरून ठरवला आहे,या ताम्रपटानुसार दृढप्रहारच्या पाचव्या पिढीतील पुत्राने शिलाहार वंशीय राजा झंज याच्या मुलीशी इ.स. ९१६ मध्ये विवाह केला होता.

यादवांची राजधानी, देवगिरीचा किल्ला
सिंदीनगर उर्फ सिन्नर येथील गोंदेश्वर मंदीर
अंकाई लेणी
दुर्वास ऋषींनी सांबाला दिलेला शाप






यादवकालीन शिलालेख
यादवकालीन नाणी
यादव घराण्याचे राजचिन्ह

यादव साम्राज्याचा विस्तार

 चौदाव्या शतकाच्या सुरुवातीला नाशिकमधील जिन प्रभासुरी नावाच्या जैन मुनीने लिहिलेल्या एका ग्रंथानुसार, दृद्बप्रहार हा द्वारवती (द्वारका) चा शेवटचा राजा वज्रकुमार याचा त्याच्या मृत्युपश्चात जन्मलेला पुत्र होता, दुर्वास ऋषींच्या शापामुळे द्वारकेचा विनाश झाला. वज्रकुमारची पत्नी नाशिकला निघून गेली आणि तीने कुंतीविहारमध्ये म्हणजे आठव्या तीर्थंकराच्या मंदिरात  एका मुलाला जन्म दिला, तो मुलगा म्हणजेच दृढप्रहार ! जिन प्रभासुरी पुढे म्हणतात की दृढप्रहारने हा देश लुटारूंपासून मुक्त केल्याबद्दल बक्षीस म्हणून त्याची राजा म्हणून निवड झाली.द्वारका व्यतिरिक्त द्वारवती हे नाव मैसूरमधील द्वारसमुद्राला देखील वापरलेले दिसते जिथे दहाव्या आणि चौदाव्या शतकादरम्यान यादवांच्या बल्लाळ शाखेची राजवट होते. मात्र यापैकी कोणत्या ठिकाणावरून हे शीर्षक घेतले गेले हे नक्की होत नाही. दृढप्रहारच्या नंतर त्याचा मुलगा सेउनचंद्र सत्तेत आला, ज्याने सिंदीनेरमध्ये सेउनपूर नावाचे शहर स्थापन केले, तेच कदाचित सध्याचे सिन्नर असावे. सेउनचंद्रच्या पुढे या घराण्याचे सात वंशज होते ज्यांपैकी शेवटचा राजा अकराव्या शतकाच्या मध्यात राज्य करत होता. जरी चांदवड  यादव हे देवगिरीच्या यादवांचे पूर्वज असले तरीही त्यांनी कोकणाचे शिलाहार आणि दक्षिणेतील कल्याणीच्या चालुक्यांशी विवाह करून नातेसंबंध प्रस्थापित केले आणि स्पष्टपणे मालखेतच्या राष्ट्रकुटांना दत्तक जाऊन त्यांच्याही जोडले गेले होते. (ही माहिती आपल्याला ज्या ताम्रपटावरून मिळाली आहे तो ताम्रपट डॉ. भाऊ दाजींना ठाण्यातील खाडीकिनारी ​​सापडला. हा ताम्रपट श्री. भगवानलाल इंद्रजींच्या ताब्यात होता मात्र तो प्रकाशित झालेला नाही. या ताम्रपटानुसार सिंहीच्या परिसरातील बारा गावांमधील  चिंचोली हे गाव इनाम देण्यात आले. चिंचोली हे गाव बहुधा नाशिक-संगमनेर रस्त्यावर देवळालीपासून सुमारे चार मैल पूर्वेस असलेले सध्याचे चिंचोली असावे आणि चिंचोलीच्या वायव्येस सुमारे तीन मैल अंतरावर सिंदे हे गाव आहे.हे दान देणार्या राजाचे नाव सेउनचंद्र ( दुसरा ) होते. आणि दानपत्राचे वर्ष आहे इ.स. १०६९ ( शक. ९९१). या राजांचा अनुक्रम असा आहे.  दृढप्रहार (सुमारे इ.स. ८५०), सेउनचंद्र ( पहिला ), द्वद्वयप्पा, भिल्लम (पहिला). श्रीराज, वरदिग ज्याने शिलाहार राजा झंज (इ.स. ९१६) याची मुलगी लाहिअब्बा हिच्याशी लग्न केले होते, यालाच पुढे एका राष्ट्रकूट राजाने दत्तक घेतले होते, वरदिगचा मुलगा, तेसुक ज्याने चालुक्यकुळातील गोगीराजाची मुलगी नय्यल्ला हिच्याशी विवाह केला, त्यानंतर भिल्लम ( दुसरा) ज्याने जयसिंग चालुक्यचा मुलगा अहवमल्ल (चालुक्य घराण्याच्या कालखंडाप्रमाणे याचा काळ इ.स. १०४०-१०६९) याचा पराभव केला होता आणि त्यानंतरचा यादव सत्ताधीश होता सेउनचंद्र ( दुसरा).. याने राज्याभिषेक करण्यापूर्वी इतर राजांवर विजय मिळवला. हे तपशील श्री. भगवानलाल इंद्रजी यांनी दिले आहेत. मात्र ताम्रपट प्रकाशित न झाल्यामुळे यामध्ये काही मुद्द्यांमध्ये दुरुस्त करणे आवश्यक असू शकते, दृढप्रहारच्या नंतरचा तिसरा वंशज  द्वदयप्पा हे नाव लाट किंवा दक्षिण गुजरातचा राजा द्वदयप्पा किंवा द्वारप याच्याशी संबधित होते, त्याचा अनहिलवाडाच्या मूलराजाने इ.स. ९७० च्या सुमारास पराभव केला.मात्र ताम्रपटात उल्लेख केलेला द्वदयप्पा हा असू शकत नाही, कारण त्याची कार्कीर्द सुमारे सत्तर वर्ष आधीची असावी. परंतु शेवटच्या चार चांदवड  यादच सत्ताधार्यानी ज्या १५० वर्षांहून अधिक काळ राज्य केल्याचा उल्लेख आहे, त्यात एखाद्या राजाचे नाव कदाचित वगळण्यात आले आहे असे दिसते. ज्या शासकाचा आपल्याला उल्लेख सापडत नाही त्यापैकी एक म्हणजे द्वदयप्पा ( दुसरा ) हा कदाचित तेसुकचा पिता असावा, ताम्रपटात जरी तेसुक आणि त्याच्या मातेचा उल्लेख असला तरी पित्याविषयी माहिती मिळत नाही] अंजनेरी मंदिरातील इ.स. ११४१ (शके. १०६३) च्या एका शिलालेखात आठवे तीर्थंकर चंद्रप्रभ यांच्या जैन मंदिराला वाणी मंत्र्याने दान दिल्याची नोंद आहे. हा वानी कदाचित  चांदवड  यादव राजवंशातील सेउणचंद्र ( तिसरा ) याचा मंत्री असावा.

निकुंभ यादव ( इ.स. १०००-१२००.) :-

         चांदवड  यादवांपेक्षा तुलनेने कमी बलवान आणि प्रभावशाली असलेले घराणे म्हणजे पाटण्याचे निकुंभ वंशीय यादव. हे पाटण म्हणजे सध्याच्या जळगाव जिल्ह्यातील चाळीसगाव जवळ असलेल पाट्ण. या घराण्याने सुमारे इ.स. १००० ते १२०० पर्यंत राज्य केले. ते शिवाचे भक्त होते आणि या घराण्यापैकी एक शासक सोनहददेव (इ.स.१२०६) यांनी खगोलशास्त्रज्ञ भास्कराचार्य यांना त्यांच्या कार्यांत मदत आणि अभ्यास करण्यासाठी धन आणि जमीन देऊन खगोलशाळा उभारल्याचा उल्लेख आहे.  या शासकांनी ज्या उपाधी धारण केलेल्या आहेत, त्या 'त्याच्या स्वामीला समर्पित,' 'त्याच्या अधिपत्याला अत्यंत समर्पित' अश्या आहेत. यावरुन हे राजे कोणात्या तरी शासकाला अंकित असावेत असा अंदाज आहे. कदाचित सुरुवातीला कल्याणी चालुक्यांचे आणि बाराव्या व तेराव्या शतकात देवगिरीचे यादव यांचे ते मांडलिक असावेत.
पाटणादेवी येथील मंदीर
पाटणादेवी येथील महेश्वर  मंदीर

बाराव्या शतकातील राज्य करणारी निरनिराळी घराणी

 मनमाडजवळील अंकाई येथील जैन लेणी कदाचित याच राजवंशाच्या काळातील आहेत. निकुंभ वंशांच्या पतनानंतर (इ.स.१२१६) नाशिक परिसरात बांधलेल्या वास्तु देवगिरीच्या यादवांच्या एका अधिकाऱ्याच्या मार्गदर्शनाखाली उभारल्या गेल्या, ज्याने बहुतेक जुनी मंदिरे, जलाशय आणि विहिरी, ज्यांना हेमाडपंती म्हणून ओळखले जाते, बांधल्या होत्या.( या वास्तु बांधल्याचे श्रेय ज्या हेमाडपंताला दिले जाते तो कदाचित धर्मशास्त्र किंवा न्यायशास्त्रावरील विपुल ग्रंथांचा  प्रसिद्ध लेखक हेमाद्रीपंत असावा. हा देवगिरीच्या यादवांपैकी पाचवे महादेव (इ.स.१२६०-१२७१) यांचा प्रधानमंत्री होता. काठियावाडमध्ये जसे यादव आणि अहिर राजे यांचे जवळचे संबंध होते, तसेच निकुंभ यादवांचे इथल्या स्थानिक गवळी राजांशी संबंध होते. मात्र बहुतेक मंदीरे जी हेमाडपंती म्हणून ओळखली जातात, त्यातील बहुतेक देवगिरी यादवांच्या काळापेक्षा जुनी आहेत. तेराव्या शतकाच्या अखेरीस मुस्लिम शासकांनी जिंकेपर्यंत देवगिरी यादवांनी नाशिकच्या दक्षिण आणि पूर्व भागावर अधिपत्य कायम ठेवले.

मुस्लिम शासक :-

             अलाउद्दीन खिलजीच्या यादव सत्ताधार्यांवरील विजयानंतर (इ.स. १२९५) सुमारे वीस वर्षे, सध्याच्या नाशिक जिल्ह्याचा बहुतांश भाग देवगिरीच्या यादवांच्या पुढील वंशजांच्या अधिपत्याच्या खाली होता. नंतर तो देवगिरी किंवा दौलताबादच्या दिल्लीच्या शासकांकडे ( इ.स. १३१२-१३४७ ) गेला, त्यांच्याकडून गुलबर्गाच्या बहमनी राजांकडे ( इ.स. १३४७-१४८७) आणि नंतर अहमदनगरच्या निजामशाही राजांकडे ( इ.स १४८७-१६३७) गेला. मात्र नाशिकच्या पश्चिमेला असलेला डांग प्रदेश स्थानिक प्रशासकांच्या हातातच राहीला, मुस्लिम शासकांच्या पारतंत्र्यात गेला नाही. इ.स. १६३७ मध्ये निजामशाही राजवंशाच्या अधःपतनानंतर, नाशिक परिसर औरंगाबादच्या मोगल प्रांतात समाविष्ट झाले. 
       इ.स. १२९७ साली रायकरण नावाचा राजा बागलाणमध्ये राज्य करत होता. अल्लाउद्दिन खिलजीने याने रायकरणचा पराभव करुन त्याची पत्नी कौलादेवी हिला गुलाम करुन दिल्लीला नेले. इ.स. १३०६ साली अल्लाउद्दीन याचा सेनापती मलिक काफुर याचा मुक्काम दक्षिणेत असताना त्याला कौलादेवीकडून दिल्लीहून निरोप आला कि, "माझी मुलगी देवलदेवी हि बागलाणचा राजा रायकरण याच्या जवळ आहे. तिच्या शिवाय दिल्लीत मला करमत नाही. तर कसेही करुन तीला दिल्लीला घेउन या". लागलीच मलिक काफुरने रायकरणला हुकूम केला, 'लागलीच देवलदेचीला आमच्या हवाली करा'. रायकरण याने हा हुकुम मान्य करायला नकार दिला आणि लढाईला सज्ज झाला. तेव्हा रायकरणची मुलगी तेरा वर्षाची होती. रायकरणने लागलीच आपल्या मुलीचे लग्न देवगिरीच्या ( दौलताबाद ) राजे रामराव याचा मुलगा शंकरदेव याच्याशी ठरवले. परंतु गुजरातचा सेनापती उल्लघखान याने बागलाणवर स्वारी केली. दोन महिने रायकरणने युध्द केले. परंतु शेवटी त्याचा पराभव झाला. मलिक काफुर देवलदेचीला घेउन जात असताना देवगिरी जवळ असताना त्याच्या फौजेपैकी ३०० सैनिक वेरुळची लेणी पहायला गेली. प्रयत्नवादी रायकरणने पुन्हा उसळी मारली. फौज कमी आहे हि संधी साधून रायकरण घोडेस्वार घेउन पुन्हा लढाईला सिध्द झाला. पण त्यातही त्याचा पराभव झाला. पुढे देवलदेवीचे ही हाल झाले. इ.स. १३१६ साली तिच्या नवर्याचे डोळे फोडून मलिक काफरने त्याला ठार केले, मलिक काफरलाही पुढे कामावरुन काढून टाकले. त्यानंतर मुबारक खानाच्या जनानखान्यात देवलदेवीला टाकण्यात आले. मुबारक खिलजी हा तिचा दीर होता. पुढे त्याचाही मलिक खुश्रूने खुन केला. 
      इकडे हत्ती, घोडे,राजवाडे वगैरे एश्वर्य वगैरेचा त्याग करुन देश सोडून रायकरण निघून गेला. कित्येक वर्ष बागलाणमध्ये राज्य करणारा रायकरण निर्वासित म्हणुन भटकत राहिला. त्याने वेष पालटला, नाव बदलले आणि तो कोठे निघुन गेला, त्याचा शेवटपर्यंत उलगडा झाला नाही.
  मुलीच्या रक्षणासाठी सर्वस्वाचा होम करणारा राजा रायकरणचा पराभव झाला तरी त्याने लढ्त दिली. होते नव्हते ते बळ खर्च केले. आपले लहानसे राज्य एवढ्या मोठ्या सैन्याशी लढत देउ शकणार नाही, तरीही लढला सर्व राज्य बेचिराख झाले तरी सर्वस्व पणाला लावले. भणंग भिकारी म्हणून देशोधडीला लागला.
इ.स. १२९७ मध्ये, अलाउद्दीन खिलजीचा सेनापती उलुघ खान याच्याकडून पराभव झाल्यानंतर, अनहिलवाडाचा शेवटचा राजा, करण, बागलाणला पळून गेला जिथे त्याने स्वतःची स्वातंत्र राजवट कायम ठेवली. पुढे मात्र त्याला इ.स. १३०६ मध्ये त्याला देवगिरीच्या रामदेव राजाकडे आश्रय घेण्यास भाग पाडले. मात्र 'इतिहासात या दुर्दैवी करणची नोंद नाही; तो कदाचित एक अज्ञातवासातील सत्ताधारी म्हणून मरण पावला.' रामदेवच्या दरबारात तो निर्वासित म्हणून राहिला असण्याची शक्यता जास्त दिसते. पुढे इ.स. १३०६ मध्ये, जेव्हा देवगिरीचे रामदेव राजाने दिल्ली सत्ताधार्यांचा मांडलिक म्हणून रहाण्यास मान्यता दिली तेव्हा त्याला स्वतःचा प्रदेश ताब्यात ठेवण्यास मान्यता मिळाली. पुढे त्याची सत्ता बागलाणपर्यंत वाढविण्यात आली,  रामदेवला  रावरायन ही पदवी आणि दक्षिण गुजरातमधील नवसारी परिसर वैयक्तिक मालमत्ता म्हणून मिळाला आणि त्यानंतर (इ.स. १३१७-१३४७ ) बागलाण किमान नावापुरते दौलताबादच्या मुस्लिम शासकांच्या अधीन झाले. मात्र पुढे झालेल्या बंडामुळे आणि बहमनी राजवंशाच्या उदयावेळी झालेल्या अशांत परिस्थितीचा (इ.स. १३४७) परिणाम म्हणून नाशिक प्रदेशाचा बराचसा भाग स्वतंत्र झाला असे दिसते. चांदोर किंवा सातमाळा टेकड्यांच्या परिसरावर बहमनी लोकांचा पक्का नव्हता आणि संपूर्ण बागलाण तर स्वतंत्र होता. इ.स. १३६६ मध्ये,  मुहम्मद शाह बहमनी विरुद्ध मराठ्यांनी जे अयशस्वी बंड केले त्यात बागलाण प्रमुख सताधीशाने भाग घेतल्याचा उल्लेख आहे. काही वर्षांनंतर, इ.स. १३७० मध्ये, मलिकने खानदेशात फारुकी राजघराण्याची स्थापना केली, तेव्हा त्याने बागलाण सरदार राजा बहिर्जीवर आक्रमण केले आणि त्याला दिल्लीच्या सताधार्यांना वार्षिक खंडणी देण्यास भाग पाडले.बहिर्जीने दिलेल्या पहिल्या खंडणीत पाच मोठे आणि दहा लहान हत्ती, मोती, रत्ने आणि पैसे यांचा समावेश होता. चौदाव्या शतकाच्या शेवटी अहमदाबादच्या मुस्लिम राजघराण्याची स्थापना झाली त्यावेळी बागलाण गुजरातच्या सुलतानाचे मांडलिक बनले .





 इ.स. १४२९ मध्ये, गुजरातच्या सुलतानाशी युद्ध करणाऱ्या अहमद शाह बहमनी यांने हा प्रदेश उद्ध्वस्त केला आणि तांबोळ्या किल्ला घेण्याचा अयशस्वी प्रयत्न केला. पंधराव्या शतकाच्या अखेरीस एका मराठा सरदाराने मालेगाव जवळील गाळणा किल्ला ताब्यात घेतला आणि परिसरात लुटमार केली. इ.स. १४८७ च्या सुमारास, दौलताबादचे वजीर मलिक वाघी आणि मलिक अश्रफ या दोन भावांनी गाळणा किल्ला परत घेतला आणि या प्रदेशाची घडी इतक्या चांगल्या पध्दतीने बसवली कि सुलतानपूर, नंदुरबार, बागलाण आणि गुजरातच्या सीमेकडे जाणारे व्यापारी मार्ग इतके सुरक्षित झाले कि प्रवाशांना सैनिकांच्या संरक्षणाशिवाय प्रवास करणे शक्य झाले  सहाजिक्च या परिसरातील लोक समाधनी झाले आणि त्यामुळे इथे समृध्दी आली.मलिक वाघीच्या हत्येनंतर झालेल्या अशांततेत, नाशिकच्या या परिसरातील सरदार पुन्हा स्वतंत्र झाले परंतु इ.स. १५०७ मध्ये अहमद निजाम शाहने त्यांना मांडलिक केले. पुढे इ.स. १५०८ मध्ये अहमद निजाम शाहच्या मृत्यूनंतर, गाळण्याच्या सरदाराने पुन्हा एकदा बंड केले आणि  इ.स. १५३० पर्यंत त्याने स्वतंत्र कारभार केला. मात्र पुढे त्याला इतर मराठा सरदारांसह, पराभूत करण्यात आले आणि खंडणी भरण्यास भाग पाडण्यात आले. मात्र त्यांनी पुन्हा स्वतःला स्वतंत्र करुन खंडणी देण्यास नकार दिला. मात्र इ.स. १५५९ मध्ये पुन्हा एकदा त्यांना मांडलिक बनवले गेले.पुढे बागलाणचे शासक गुजरातच्या राजांशी एकनिष्ठ राहिल्याचे दिसून येते त्यांच्याकडून त्यांनी तीन हजार घोडे घेऊन त्यांची सेवा केली होती.



      इ.स. १५७३ मध्ये, अकबराने गुजरात जिंकला, तेव्हा बागलाणचा बहिर्जी ३००० घोडे घेऊन सुरत येथे अकबराला भेटून त्याचे मांडलिकत्व पत्करले. इतकेच नव्हे तर अकबराच्या मेहुण्याने म्हणजे मिर्झा शरीफ-उद्दीन हुसेन बंड केले व बागलाण प्रदेशातून जात असताना त्याला या बहिर्जीने पकडून अकबराच्या स्वाधीन केले. ऐन-ए-अकबरी या ग्रंथात (इ.स.१५९०) मध्ये बागलाणचे वर्णन सुरत आणि नंदुरबार दरम्यान एक डोंगराळ, पण बरीच लोकवस्ती असलेला प्रदेश म्हणून केले आहे. या प्रदेशाचा प्रमुख राठोड जमातीचा होता आणि त्याच्याकडे ८००० घोडदळ आणि ५००० पायदळ सैन्य होते. या प्रदेशात सात किल्ले होते, त्यापैकी दोन, मुल्हेर आणि सालेर, हे महत्वाचे आणि बळकट दुर्ग होते. हा प्रदेश इतका समृध्द होता कि इथे जर्दाळू, सफरचंद, द्राक्षे, पाइन सफरचंद, डाळिंब आणि लिंबूवर्गीय फळे पिकत होती. इ.स. १५९९ मध्ये जेव्हा अकबरने खानदेश जिंकला तेव्हा अकबराने लगेच बागलाण ताब्यात घेण्याचा प्रयत्न केला.त्याने सरदार प्रतापशहा याच्या या मुलुखाला सात वर्षे वेढा घातला होता, मात्र बागलाणात असणारी भरपुर कुरण, पिकणारे धान्य आणि मुबलज पाणी असल्याने आणि मह्त्वाचे म्हणजे या प्रदेशाचा भुगो. इथे अरुंद खिंडी असलेया पर्वतांची जणु मजबूत तटबंदी होती आणि खिंडी इतक्या अरुंद असल्याने की दोनपेक्षा जास्त माणसे पुढे जाऊ शकत नव्हती, त्यामुळे अकबराने शेवटी प्रतापशहाशी तह करुन त्याला निजामपूर, दातिया आणि बादूरसह इतर अनेक गावे दिली. त्या बदल्यात प्रतापशहाने त्याच्या प्रदेशातून जाणाऱ्या व्यापाऱ्यांची काळजी घेण्यास, तसेच सम्राट अकबराला भेटवस्तू पाठवण्यास आणि त्याच्या एका मुलाला बुरहानपूर येथे ओलिस ठेवण्यास सहमती दर्शविली. परकिय प्रवाशांनी नोंदलेल्या निरीक्षणानुसार  दमन, गुजरात आणि दक्षिणेकडील प्रांताचा अधिपती म्हणून साल्हेरच्या चार मैल आग्नेयेस असलेया किरोलीचा सरदाराकडे नेहमीच ४००० उत्कृष्ट जातीचे घोडे आणि शंभर हत्ती तयार  असायचे असे म्हटले जाते. जेव्हा अहमदनगरच्या मलिक अंबरने इ.स.१६०९ ला सुरतेवर हल्ला केला, तेव्हा हल्ल्यापासून सुरतेचे रक्षण करण्यासाठी धरमपूरमधील रामनगर येथे तैनात असलेल्या सैन्यासाठी साल्हेर आणि मुल्हेरच्या सरदाराने बागलाणमधून ३००० सैन्य पाठवले. सोळाव्या शतकाच्या अखेरीस आणि सतराव्या शतकाच्या सुरुवातीच्या काळात, बागलाण प्रदेशाने १५८० ते १५८९ दरम्यान, दोन टप्प्याचा चांगले शासन असलेला काळ अनुभवला. मुर्तजा निजाम शाहचा मंत्री सलाबत खानच्या नेतृत्वाखाली आणि महमूद शाह बहमनी (इ.स १३७८-१३९७) च्या कारकिर्दीत या परिसरात चांगले प्रशासन होते. मोगलांनी अहमदनगर ताब्यात घेतल्यानंतर (इ.स.१६००), नाशिकचा बहुतांश भाग राजू मियानच्या ताब्यात गेला, त्याने हा प्रदेश अहमदनगरच्या वजीर मलिक अंबरकडून ताब्यात घेतला. मात्र इ.स.१६०३ मध्ये राजू मियानचा पराभव झाला आणि त्या काळापासून पुढे इ.स. १६२६ मध्ये मलिक अंबरच्या मृत्यूपर्यंत, नाशिक पुन्हा एकदा निजामशाहीच्या अधिपत्याखाली होता.
         शाहजहानच्या कारकिर्दीच्या सुरुवातीच्या काळात ( इ.स १६२९-३०), दिल्लीतील प्रमुख सरदारांपैकी एक असलेल्या खान जमान लोदीने बंड केले आणि तो जवळजवळ संपूर्ण दख्खनचा अधिकारी बनला.म्हणून नाशिक, त्र्यंबक आणि संगमनेर परत मिळवण्यासाठी खाजा अबुल हसनच्या नेतृत्वाखाली ८००० घोडदळाची तुकडी पाठवण्यात आली. पावसाळ्यानंतर खाजाने बागलाणात प्रवेश केला तेव्हा बागलाणाच्या प्रमुख त्याला ४०० घोडे घेऊन भेटला. यावेळी परिस्थिती भीषण होती. महसूल अधिकारी आणि शेतकरी त्यांची गावे सोडून जंगलात आणि डोंगरात पळून गेले होते. जमीन ओसाड झाली होती, धान्य महाग होते आणि मोघलांच्या शाही सैन्याच्या सैनिकांना अन्नाची कमतरता भासत होती. सैन्याच्या तुकड्या डोंगरात पाठवण्यात आल्या आणि तिथून ते भरपूर धान्य आणि इतर आवश्यक वस्तू घेऊन परतले. शेर खान गुजरातहून सुमारे २६,००० सैनिकांच्या रसदीसह आला, त्याने चांदोर ताब्यात घेतले, हा मुलुख उद्ध्वस्त केला आणि मोठ्या प्रमाणात लूट घेऊन परतला. पुढच्या वर्षी पाऊस पडला नाही आणि बागलाण देश दुष्काळाने उद्ध्वस्त झाला. अहमदाबाद ते दौलताबाद पर्यंतच्या संपूर्ण पश्चिम भारतात, समृद्धतेसाठी प्रसिद्ध असलेल्या जमिनी पूर्णपणे नापीक झाल्या होत्या; एका भाकरीच्या तुकड्यासाठी लोक हतबल झाले होते. नेहमीच दान देणारे उदार हात भिक्षा मागण्यासाठी पसरवले जात होते; आणि श्रीमंत लोक अन्नाच्या शोधात भटकत होते. कुत्र्याचे मांस विकले जात होते आणि मृतांच्या हाडांची फोडणी पीठात मिसळली जात होती. अगदी स्वतःच्या मुलाचे मास खाण्यापर्यंत लोकांची मजल गेली होती. मृतांची संख्या इतकी होती, त्यामुळे रस्ते भरुन गेले होते. जे या भयानक परिस्थितीतून वाचले ते या प्रदेशातून पळून गेले. दुष्काळाने होरपळलेल्या लोकांसाठी अन्नछत्रे उघडली गेली. इथे दररोज भाजी, भाकरी वाटली जात होती. तसेच दर सोमवारी पात्र गरिबांन रु. ५००० दिले जात होते. इथल्या शासकांनी महसुल सार्यात मोठी कपात करुन जनतेला दिलासा देण्याचा प्रयत्न केला. मात्र इ.स. १६३७ मध्ये निजामशाही राजवटीची अखेर झाली नंतर, आणि बागलाणमध्ये मोगलांचे वर्चस्व वाढले आणि खानदेश आणि दौलताबाद हे प्रांत औरंगजेबाच्या अखत्यारीखाली आले, त्याने दौलताबादच्या आग्नेयेस सुमारे दहा मैल अंतरावर औरंगाबाद येथे आपली राजधानी स्थापन केली. त्याच वर्षी औरंगजेबाने बागलाणचा डोंगराळ प्रदेश ताब्यात घेतला आणि त्याला ३००० घोडदळाचा प्रमुख बनवण्यात आले आणि सुलतानपूरचे जहागिरी दिली गेली. त्याचप्रमाणे त्याला १,००,००० रुपये खंडणी देऊन धरमपूरमधील रामनगर देण्यात आले. याचवेळी मुल्हेरला औरंगगड आणि साल्हेरला सुलतानगड असे नाव दिले गेले.



यावेळी बागलाणचे वर्णन असे केले जात होते कि हा प्रदेश समशीतोष्ण हवामानाचा असुन येथे असंख्य नद्या, ओढे आहेत आणि इथे मोठ्या प्रमाणात झाडे आणि फळ आहेत. हा भुभाग २०० मैल लांब आणि १६० रुंद आहे, त्यात चौतीस लहान प्रशासकीय विभाग होते आणि सुमारे १००० गावे होती. उत्तरेला सुलतानपूर आणि नंदुरबार, पूर्वेला चांदोर, दक्षिणेला त्र्यंबक आणि नाशिक आणि पश्चिमेला सुरत आणि पोर्तुगीजांचा प्रदेश होता. मात्र औरंगजेबाच्या बागलाणवरील विजयानंतर लगेचच पोवार किंवा दळवीच्या एका कामविसदाराने बंडखोरी केली, त्याला औरंगजेबाच्या आदेशाने दिल्लीला पाठवण्यात आले आणि मृत्युदंडाची शिक्षा सुनावण्यात आली. मात्र मृत्युदंडाची वाट पाहत असताना कैद्याने मोघल सम्राटाच्या मुलीला दम्याचा त्रास बरा केला आणि इस्लाम स्वीकारल्यानंतर त्याला जीवनदान तर मिळालेच वर बक्षीसही दिले गेले.
       सतराव्या शतकात भारताला भेट दिलेला प्रवासी टॅव्हर्नियर (१६४०-१६६६) यांच्या मते, बागलाण, ज्यामध्ये तो किनारपट्टीवरील पोर्तुगीजांच्या ताब्यातील प्रदेश वगळता उत्तर कोकणाचा समावेश करतो, हा भुभाग सुरत आणि गोवळकोंडा दरम्यानच्या मोठ्या प्रमाणात चालणार्या माल वाहतुकीमुळे समृद्ध झाला असे वर्णन करतो. त्याने जे पश्चिम खानदेशाचे केलेले वर्णन हे सध्याच्या नाशिक जिल्ह्याशी संबंधित आहे. हा प्रदेश वड, आंबा, मोहाची झाडे, काजु , खजुर किंवा जंगली खजूर आणि इतर झाडांनी भरलेला होता. इथे मोठ्या संख्येने काळवीट, ससे आणि तीतर होते आणि डोंगराळ भागात नील गायी होत्या. अनेक ठिकाणी ऊस पिकवला जात होता आणि साखर बनवण्यासाठी गिरण्या आणि भट्ट्या होत्या.व्यापारी मार्ग उत्तमपणे संरक्षित होते. टॅव्हर्नियरचा वृत्तांत, इतर उताऱ्यांप्रमाणेच, थेव्हनॉट (१६६६) मधून घेतलेला आहे. द व्हेनॉटच्या वर्णनातील तपशील हे छ्त्रपती शिवाजी महाराजांनी बागलाण ताब्यात घेण्यापुर्वी या भागाची परिस्थितीचे वर्णन आहे. सुरतहून गोवळकोंडा हा प्रवास करताना (२६ फेब्रुवारी - ११ मार्च १६६G) त्याने दोन बैलगाड्या भाड्याने घेतल्या. एक स्वतःसाठी, दुसरी त्याच्या सामानासाठी आणि नोकरासाठी. प्रत्येक गाड्याचे मासिक भाडे सुमारे सतरा मोहरा होते ( म्हणजे रु. ३४ ) त्याने दोन शिपाई नियुक्त केले ज्यांना दरमहा दोन मोहरा पगार दिला जाई आणि जेवणाचा भत्ता म्हणून प्रतिदिन दोन दाम सहा दिनार (सुमारे १ आणे) देत ​​असत. त्याने बरोबर घेतलेले लोक राजपूत होते ज्यांचे कारण म्हणजे हे लोक मुसलमानांपेक्षा कमी गर्विष्ठ होते. प्रत्येकाकडे तलवार, खंजीर, धनुष्य आणि बंदूक किंवा भाला असे आणि ते रात्री पहारेकरी म्हणून काम करत,त्याच बरोबर सरपण गोळा करत आणि स्वयंपाकही करत असत. 
या छत्तीस जणांच्या काफिलातील एक थेवेनॉट हा होता, त्या छत्तीस जणांपैकी आठ फ्रेंच होते, त्यातील एक एम. बाझोन हा श्रीमंत व्यापारी होता ज्याच्याकडे दहा गाड्या आणि चौदा शिपाई होते. सुरत सोडण्यापूर्वी त्यांनी बिस्किटांसह अन्नधान्याचा साठा केला, कारण वाटेतील गावातील हिंदूं लोक कोंबडी आणि अंडी विकत नसत आणि केकपेक्षा अर्धवट शिजवलेल्या भाकर्या त्याला आवडत नव्हत्या. सुरत ते औरंगाबाद हा २२५ मैलांचा प्रवास चौदा दिवसांत झाला, म्हणजेच दररोज सरासरी सोळा मैलांचे अंतर कापले गेले. बारडोली १५ मैल, वलसाड १२ मैल, व्हायारा १०°, चरका ७, नवापूर १८, पिंपळनेर १८, ताहाराबाद १२, सटाणा १३, उमराणा १६, अंकाई-टंकाई १८, देवचम १८°, लासुरा १८, खानापूर १८, औरंगाबाद २४ असे टप्पे होते. वाटेत दिसणारी दृश्ये खूप वैविध्यपूर्ण होती. काही भाग जंगली आणि डोंगराळ होता पण बहुतेक जमीन लागवडीखाली होती; मैदानी प्रदेशात मोठ्या प्रमाणात तांदळाची शेती होती, नवापूरजवळ उगवलेला सुगंधी तांदूळ भारतातील सर्वोत्तम होता. अनेक ठिकाणी कापूस आणि ऊस मोठ्या प्रमाणात होता, प्रत्येक उस मळ्याला स्वतःची भट्टी आणि गिरणी होती.  त्यांचा प्रवास चार शहरे आणि चौतीस किंवा पस्तीस खेडे गाव आणि मोठ्या गावांमधून झाला. या प्रवासात त्यांना गस्ती सैनिकांच्या तुकड्या आणि  प्रवाशांकडून पैसे मागणारे जोगी, गोसावी भेटले. वाटेत त्यांना असंख्य मंदिरे, जलाशय आणि अस्वच्छ विश्रामगृहे लागली. संपूर्ण मार्गावर त्यांना हिंदू यात्रेकरूंनी भरलेल्या गाड्या आणि बैल आणि उंटांचे काफिले भेटत राहिले, त्यापैकी एक काफीला आग्राहून आलेला होता, ज्यामध्ये कापसाच्या कापडाने भरलेल्या एक हजाराहून अधिक बैलगाड्या होत्या. औरंगजेबाने या प्रदेशामध्ये मिळवलेल्या विजयानंतर जो शांततेच्या काळ निर्माण झाला, त्यात शाहजहानने तोडरमलने घालून दिलेली महसूल व्यवस्था सुरू केली आणि त्यावेळी निश्चित केलेले दर अगदी ब्रिटिश सत्तेच्या स्थापनेपर्यंत कायम राहिले.

मराठा साम्राज्य ( इ.स. १६७०-१७६० ) :-

   सतराव्या शतकाच्या मध्यात, शाहजहानच्या पुत्रांमधील आपापसात झालेल्या संघर्षानंतर झालेल्या गोंधळाचा फायदा घेत, छ्त्रपती शिवाजी महाराजांनी बागलाण आणि नाशिकमधील सह्याद्री शिखरांवर आपले अधिपत्य स्थापन केले. 



मात्र मोगल राजवंशात निर्माण झालेला गोंधळ औरंगजेबाच्या सत्ताग्रहणानंतर मिटल्यामुळे त्यांना काही काळ शांत राहावे लागले. परंतु, इ.स. १६६६ मध्ये,  आग्र्याहून सुटका होउन परतल्यानंतर, त्यानी मोठ्या प्रमाणात या प्रदेशावर स्वार्या सुरू केले. इ.स. १६७० मध्ये, सुरतवर दुसऱ्यांदा स्वारी केल्यानंतर, राजगडाकडे परत जाताना कोकणातून बागलाण व सातमाळा रांग ओलांडताना कांचन -मांचन गडाजवळ मोगल अधिकारी दाऊद खानच्या नेतृत्वाखाली ५००० घोडदळांच्या तुकडीने शिवाजी महाराजांचा मार्ग रोखला.




कांचनबारीचे लढाई

      सुरुवातीला दाऊद खानच्या आगमनाने कोणताही धोका निर्माण झाला नाही; परंतु बरोबर सुरतेमधून लुटलेली संपत्ती असल्यामुळे ती सर्व दुसर्या मार्गाने ( कदाचित मार्किंडा आणि रवळया-जवळ्या यांच्या खिंडीमधून जाणार्या रस्त्याने पाठवली ) आणि दाउदखानाने बरोबर आणलेल्या मोठ्या संख्येच्या मोघली सैन्याचा मुकाबला करण्यासाठी शिवाजी महाराजांनी आपले सैन्य चार किंवा पाच तुकड्यांमध्ये विभागले आणि स्वतः पुढे सरकले कांचन- मांचनच्या खिंडीमध्ये शत्रुचा मुकाबला करण्यासाठी सज्ज झाले. दाऊद खान जवळ आला तेव्हा, शिवाजी महाराजांनी त्याच्यावर हल्ला केला आणि त्याला मागे हटवले. सर्व बाजुने हल्ला झाल्यामुळे मोघल सैन्य पळून गेले. 





साल्हेरची लढाई

      त्यानंतर काही महिन्यांनंतर प्रतापराव गुजरने उत्तर नाशिक परिसर तर जिंकलाच आणि तिथल्या गावांमधून  चौथाई मिळवली. आणि त्यानंतर लवकरच मोरोपंत पिंगळेनी औंढा, पट्टा किल्ले जिंकून दोघांनी मिळून साल्हेर, मुल्हेर सारखे बलाढय किल्ले जिंकून घेतले. मात्र त्याच वर्षी औंढा आणि पट्टा मोगलांनी परत मिळवले आणि १६७२ मध्ये महाबतखानने साल्हेरला वेढा घातला. शिवाजी महाराजांनी हा वेढा उठवण्यासाठी पाठवलेल्या सैन्यावर मोगलांनी हल्ला केला, परंतु थेट समोरासमोर झालेल्या मैदानी लढाईनंतर मोगलांचा मोठा पराभव झाला, साल्हेरचा वेढा तर उठवण्यात आलाच पण मराठ्यांनी औंढा आणि पट्टा परत मिळवला. पाच वर्षांनंतर (१६७९) शिवाजी महाराजांनी भीमा नदी ओलांडून मोगली प्रदेशात स्वारी करुन खानदेशचा प्रदेश लुटला. परत येताना जालना पेठ लुटून माघारीच्या वेळी संगमनेरजवळ त्याच्यावर मोगलांनी  हल्ला केला. शिवाजी महाराजांनी हा पहिला हल्ला तर परतवण्यात यश मिळाले, परंतु शिवाजी महाराज पुढे जाण्यापुर्वी मोगलांच्या दुसऱ्या तुकडीने त्यांचा मार्ग रोखला मात्र शिवाजी महाराजांबरोबर असणार्या बहिर्जी नाईकासारख्या हुशार गुप्तहेरामुळे मोघलांपासून वाचून सुरक्षितपणे पट्टागडावर पोहोचू शकले. शिवाजी महाराजांच्या मृत्युनंतर ( इ.स. १६८०) मोगल सत्तेचे पुनरुज्जीवन झाले.इ.स. १६८४ मध्ये शहाजादा मुहम्मद आझमने  लाच देऊन साल्हेरचा किल्ला जिंकला, परंतु नाशिकजवळील रामसेजच्या चिवट किल्लेदाराने त्याला यश मिळू दिले नाही. त्यामुळे मोगलांची पाठ वळल्याबरोबर ( इ.स. १६८५) मराठा सेनापती हंबीरराव कोकणातून निघून नाशिक परिसरात गेले आणि खानदेश लुटला आणि सातमाळांच्या पायथ्याशी असलेल्या प्रदेशाची लुटमार करुन नाशिककडे निघून गेले. हा  संघर्ष चालू पुढे वीस वर्षे चालु राहिला आणि दोन्ही बाजुकडून किल्ले घेतले आणि परत घेतले गेले आणि परिणाम म्हणून मराठा साम्राज्य देशभर पसरले. 
       मुस्लिम इतिहासकारांच्या मते, मोघल शासित भुभागात अराजकता वाढण्याची प्रमुख कारणे अशी होती की, मुलुखाच्या आधीच्या शक्तिशाली सुलतानांऐवजी लोभी सुलतांनाकडे ताबा गेला आणि त्यांनी लोकांवर अत्याचार केले. सरदार आणि मोठे जमीनदार कर देण्यास नकार देत होते आणि सुलतान त्यांना सक्ती करू शकत नव्हते. शेतकऱ्यांवर अत्याचार होत होते आणि ते शेती सोडून सैनिक बनले होते. शाही सैन्य केवळ वेढा घालण्यात व्यस्त होते आणि मराठे त्यांच्यावर वाटेल तिथे हल्ला करत होते. इ.स. १७०४ मध्ये औरंगजेबाने गाळणा किल्ल्यावर हल्ला केला आणि इ.स १७०५ मध्ये तो ताब्यात घेतला. वेढा घालताना मराठ्यांनी शाही छावणीला जाणारी सर्व रसद थांबवली आणि त्याचवेळी आलेल्या दुष्काळाने अनेक लोक मृत्युमुखी पडले. त्यांचा म्हणजे मराठ्यांचा धीटपणा एवढा वाढला होता कि आठवड्यातून एकदा ते औरंगजेबाच्या दीर्घायुष्यासाठी प्रार्थना करत असत, कारण औरंगजेबाची युद्ध करण्याची पद्धत त्यांच्या रणनीतीला अनुकूल होती. नाशिक किंवा गुलशनाबादच्या अधिकार्याच्या सेवेत असलेल्या एका मराठा सरदाराने दरोडेखोरांची टोळी ठेवली होती आणि तो उघडपणे लूटमार करत असे असे म्हटले जाते. औरंगजेबाच्या मृत्युनंतर (इ.स. १७०७) अराजकता वाढली. इ.स. १७१३ मध्ये, दिल्लीतील प्रमुख सरदार हुसेन खानने मराठा खंडेराव दाभाडे विरुद्ध नाशिकला सैन्य पाठवले. ही मोहीम पूर्णपणे अपयशी ठरली. दुसरी मोहीम म्हणजे अहमदनगरजवळील लढाई, मात्र यश पुन्हा मराठ्यांच्या हाती आले. शेवटी, बर्याच वाटाघाटींनंतर, पेशवे बाळाजी विश्वनाथ यांच्या सक्षम नेतृत्वाखाली, मराठ्यांना चौथाईचा हक्क मिळाला.
निजाम उल मुल्क

 लवकरच मोगलांकडून ( इ.स १७२३) चिन कालिच खान उर्फ निजाम-उल-मुल्क याची दख्खनमध्ये स्वतंत्र शासक म्हणून नेमणुक झाल्यामुळे थेट दिल्लीचे वर्चस्व संपले. चिन कालिच खानने दख्खनच्या मुस्लिम सैन्यामध्ये नवीन जोम आणला. ज्या रस्त्यांवर बराच काळ दरोडेखोरी चालायची तसेच त्यामुळे व्यापार बंद झाला होता, ते रस्ते सुरक्षित करण्यात आले आणि मराठा सैन्याकडून जो कर वसूल केला जात असे त्याच्या वसुलीला विरोध झाला.अर्थात हि गोष्ट मराठी सैन्याला मान्य होण्यासारखी नव्हती. मात्र या दोन्ही सैन्यादरम्यान जी पहिली चकमक झाली त्यात दोन्ही पक्षांना कोणतेही लक्षणीय यश न मिळताच संपल्याचे दिसून येते, जरी निजामाचा नाशिकवर ताबा असला आणि मुल्हेर आणि बागलाण येथील अधिकारी त्याचेच होते, तरी मराठ्यांनी चौथाई कर वसूल करणे सुरू ठेवले अर्थात मराठ्यांच्या आणि मुसलमानांच्या कागदपत्रात यावावत एकमत नाहीत. मराठ्यांच्या पुराव्याच्या मते तहाच्या अटी बाजीरावांनी ठरवल्या तर मुसलमानांच्या इतिहासकारांच्या मते अटी निजामाला अनुकूल होत्या, कारण मराठ्यांनी आतापर्यंत ठरलेल्या रकमेपेक्षा जास्त खंडणी किंवा जास्त कर वसूल केला होता. .इ.स १७४७ मध्ये ( शके ११६०) अहमदाबाद ते होशंगाबाद पर्यंत संपूर्ण देश दुष्काळाने इतका ग्रासला की धान्याचा दर प्रति मोहर ४ मण इतके वाढले.  पुढच्या वर्षी (इ.स. १७४८) निजाम चिन किलिच खानचा मृत्यू झाला. त्याच्या मृत्युनंतर मराठ्यांनी उचल खाल्ली.  मराठ्यांनी नाशिकजवळील त्र्यंबकगडावर अचानक हल्ला करुन त्याचा ताबा घेतला. इ.स. १७५२ मध्ये, नवीन निजाम सलाबत जंग हा अहमदनगरहून जुन्नर शहर ताब्यात घेण्यासाठी निघाला. मात्र मराठ्यांनी सैन्याची हालचाल करुन त्याच्यावर दबाव आणला आणि त्याच वेळी त्याचा मोठा भाऊ गाजी-उद्दीन जो मराठ्यांना सामील होता, यानेही त्याच्यावर हल्ल्याची धमकी दिली, त्यामुळे त्याने युद्धबंदी मान्य केली. 
      इ.स. १७६० मध्ये मराठ्यांनी उदगीर येथे सलाबत जंगवर हल्ला केला आणि त्याला हरवून सिन्नर आणि इतर किल्ले देण्यास भाग पाडले आणि नाशिकच्या दक्षिणेकडील अर्ध्या भागासह इतर जिल्ह्यांचा परिसर मराठ्यांना स्वाधीन करण्यास भाग पाडले. पुढच्या वर्षी (इ.स.१७६१) निजामने पानिपत येथे मराठ्यांवर झालेल्या विध्वंसाचा फायदा घेत पुण्यावर कूच केले आणि पेशव्यांना अलीकडेच देण्यात आलेले काही जिल्हे परत मिळवण्यात यश आले. मात्र मराठ्यांनी याचा वचपा काढून त्याचा पराभव केला, त्याचे बरेच सैन्य कापला गेले आणि त्याला त्याच्या पूर्वीच्या अटीवर तह करण्यास भाग पडले. 
 माधवराव पेशवे
रघुनाथराव पेशवे

    मात्र हा शांततेचा काळ फार टिकला नाही,पेशवे माधवराव आणि त्याचे काका रघुनाथरव (इ.स. १७६२) यांच्यात मतभेद निर्माण झाले. त्यामुळे रघुनाथरावाने नाशिक सोडून मोठा सैन्य गोळा करून,पुण्याकडे कूच केले, वाटेत त्याच्या पुतण्याच्या म्हणजे माधवराव पेशव्यांच्या सैन्याचा पराभव केला. या अंतर्गत वादाने निराश होउन माधवराव पेशव्यांनी दूरदृष्टी दाखवून राज्याचे संपूर्ण विभाजन रोखण्याचा एकमेव मार्ग म्हणून स्वतःला काकांच्या सत्तेत रहाण्याचा निर्णय घेतला आणि जोपर्यंत रघुनाथराव पेशव्यांना विवेकबुद्धीने माधवरावांचा अधिकार आणि क्षमता मान्य पुन्हा माधवराव पेशव्यांकडे सत्ता सोपवली नाही तोपर्यंत माधवराव त्याच्या काकांच्या आज्ञेत राहिले.  पुढे इ.स. १७६४ मध्ये, जेव्हा हैदर अलीविरुद्ध कारवाई करण्यासाठी पुण्यात एक मोठी सेना जमली, तेव्हा माधवरावने राघोबादादाना सेनापती पदाचा अधिकार ग्रहण करण्याचा आग्रह धरला. रघुनाथरावने आपली संमती दिली, मात्र प्रत्यक्षात हैदर अलीबरोबर करार केला गेला. शेवटी आपल्याला पेशवे पद मिळत नाही असे दिसल्यावर रागाच्या भरात पुण्याला सोडून रघुनाथराव नाशिकजवळील आनंदवल्ली येथे स्थायिक झाला, जिथे तो धारवाडच्या वेढा पडेपर्यंत राहिला, जेव्हा पेशव्यांनी युद्ध यशस्वीरित्या पार पडण्यासाठी रघुनाथरावला त्याच्यात सामील होऊन सेनापती होण्यास सांगितले. यावर रघुनाथराव सहमत झाला. परंतु त्याच्या पुढील उत्तरेकडील मोहिमेवरून परतल्यानंतर, त्याच्या पत्नीच्या आनंदीबाईंच्या सल्ल्याने, त्याने मराठा सार्वभौमत्व सत्तेच्या अर्ध्या भागावर आपला दावा मांडण्याचा निर्धार केला.इ.स. १७६८ च्या शेवटी, त्याने १५,००० पेक्षा जास्त सैनिकांची फौज जमवली आणि नागपूरच्या जानोजी भोंसला सामील करुन त्याने प्रथम गोदावरीच्या काठावर आणि नंतर सातमाळा रांगेतील धोडप किल्ल्याच्या परिसरात तळ ठोकला.त्याचे प्रमुख समर्थक दामाजी गायकवार होते, ज्यांनी त्याचा मोठा मुलगा गोविंदराव आणि होळकरचा मंत्री गंगाधर यशवंत यांच्या नेतृत्वाखाली काही सैन्य पाठवले होते, गंगाधर यशवंत हा  रघुनाथरावांचा समर्थक असण्यासोबतच पेशव्यांबद्दल वैयक्तिक द्वेषही बाळगत होता. 
 धोडपचा किल्ला

माधवरावने जानोजी भोंसलाच्या योजनेचा अंदाज घेउन धोडप येथे कूच केले जिथे त्यानी रघुनाथरावांच्या सैन्यावर हल्ला केला आणि त्यांचा पराभव केला, रघुनाथरावाला किल्ल्यात आश्रय घेण्यास भाग पाडले आणि शरण जाण्यास भाग पाडले आणि राघोबाला कैद करून पुण्याला नेऊन पेशव्यांच्या वाड्यात बंदिस्त केले. पेशवेपदाची आस बाळगून इंग्रजांना सामील झालेल्या राघोबदादाला पहिल्या इंग्रज- मराठा युद्ध (१७७५-१७८२) झाल्यानंतर सालबाईच्या तहानुसार (७ मे १७८२) पुन्हा माधवराव पेशव्यांकडे सोपवले गेले. त्यानंतर रघुनाथरावाने राजकारणातून निवृत्ती घेउन आपल्या कुटुंबासह अहमदनगरमधील गोदावरीवरील कोपरगावला स्थायिक झाले, तिथे सुमारे एक वर्षात त्यांचे निधन झाले. त्यांच्या मृत्यूनंतर लवकर, एप्रिल १७८४ मध्ये, त्यांच्या विधवा पत्नी आनंदीबाईंनी चिमनाजी अप्पा या मुलाला जन्म दिला. हे कुटुंब इ.स.१७९३ पर्यंत कोपरगावात राहिले, त्यानंतर त्यांना नाशिकजवळील आनंदवल्ली येथे हलवण्यात आले, कारण विधवा आनंदीबाईंची तब्येत बिघडली होती आणि पुढच्या वर्षी एप्रिलमध्ये त्यांचे निधन झाले. दत्तक मुलगा अमृतरावसह बाजीराव आणि चिमनाजी अप्पा आनंदवल्ली येथेच राहिले, मात्र इ.स. १७९५ पर्यंत निजामाशी शत्रुत्व असल्याने त्यांना पुण्यातील शिवनेरीच्या डोंगरी किल्ल्यावर ठेवण्यात आले. 
चांदवड्चा किल्ला

       पुढे १३ मार्च १७९५ मध्ये खर्डा येथील लढाईनंतर झालेल्या पराभवानंतर, निजामने बागलाण आणि गाळणा यासह खानदेशातील त्यांच्या ताब्यातील भुभाग पेशव्यांना दिला, ज्यामध्ये सध्याचे कळवण, बागलाण, मालेगाव, नांदगाव आणि चांदोरचे काही भाग होळकरांना देण्यात आला आणि उर्वरित भाग पेशव्यांकडेच राहिला. इ.स. १७९६ मध्ये पेशवा माधवराव दुसरा यांच्या मृत्युनंतर, अभूतपूर्व गोंधळ आणि अराजकतेचा काळ सुरू झाला, याचा परिणाम म्हणून  ब्रिटिशांनी हा सर्व प्रदेश जिंकण्यात झाला.इ.स.१८०२ मध्ये, यशवंतराव होळकर मोठ्या सैन्यासह मालेगाव आणि चांदोर ओलांडून पुण्याला जाताना, त्यांनी वाटेत सरदार नरसिंग विंचूरकरांना पराभूत केले, त्यांची गावे लुटली आणि उभी पिके नष्ट केली.त्यातच पेंढार्यानी, त्यांचे नेते मुका आणि हिम यांच्या नेतृत्वाखाली, विंचुरकरांचा पाठलाग केला आणि संपूर्ण नाश केला. परिणामी बागलाणात अन्नधान्याचा पूर्णपणे अभाव झाला, बाजरीचे उत्पादन १ किलो प्रति मोहर होते. हा दुष्काळ एका वर्षापर्यंत टिकला आणि एप्रिल ते ऑगस्ट १८०४ दरम्यान रयत होरपळून निघाली. मोठ्या संख्येने लोक गुजरातमध्ये स्थलांतरित झाले. जे राहिले त्यापैकी ७००० ते ९००० लोक मरण पावले असा अंदाज आणि वाचलेल्यांपैकी बरेच जण जंगली फळे आणि भाज्यांवर जगत होते. गायी, म्हशी आणि अगदी मानवी मांसही खाल्ले जात असे असे म्हणतात. पेशव्यांनी किनाऱ्यावरून धान्य आयात केले आणि या भागातील महसूल माफ केला. खाजगीरित्या दानधर्म देखील मोठ्या प्रमाणात केला गेला. दोन-तीन वर्षांनी दुष्काळ कमी झाला, धान्याचे दर पुन्हा पहिल्या इतके खाली आले आणि बहुतेक लोक परत आले. परंतु नंतर ओसाड पडलेल्या काही गावांमध्ये कधीही शेती केली गेली नाही.
वेलस्ली
दुसरा बा़जीराव
यशवंतराव होळकर

 इ.स. १८०२ मध्ये, होळकर पुण्याजवळ येताच,दुसरा बाजीराव वसईला गेला आणि अखेरचा उपाय म्हणून ( इ.स. ३१ डिसेंबर १८०२) वसईच्या करारावर स्वाक्षरी केली. इ.स. १८०३ मध्ये दुसर्या बाजीरावचा दत्तक भाऊ अमृतराव याच्याकडून पुणे शहरावर हल्ला केला गेला, तेव्हा पुणे शहर विनाशापासून वाचवण्यासाठी पुण्यामध्ये सर ए. वेलेस्लीने प्रवेश केला. त्यामुळे  अमृतराव संगमनेरला निघून गेला, त्याने त्या प्रदेशाची नासधूस केली आणि नंतर नाशिककडे वळला,आणि मालेगावच्या अधिकारी बाजीरावच्या पक्षातील बहादूरच्या नेतृत्वाखालील सैन्याच्या तुकडीचा पराभव केला, त्याला नाशिक बाजुला हुसकावून लावले आणि युद्धाच्या अखेरीपर्यंत तो त्याच परिसरात राहिला, पुढे त्याने इंग्रजांशी करार केला. होळकरांच्या अखत्यारीतील दख्खन भागातील प्रदेश आणि चांदवड, गाळणा आणि इतर किल्ले      इंग्रजांनी ताब्यात घेतले. इ.स. १८०५ मध्ये, होळकरांबरोबर झालेल्या समेटानंतर, चांदवड, अंबड आणि शेवगाव वगळता होळकरची सर्व मालमत्ता त्यांना परत देण्यात आली आणि हे किल्ले देखील दोन वर्षांनी परत देण्यात आले.

भिल्लांचे हल्ले ( इ.स. १८०२-१८१६ ) :-

   या सर्व  गोंधळाच्या काळात अजून थोडी भर पडली ती भिल्लांमुळे ! बागलाण परिसरातील गावात रहिवाशांसोबत राहणारे आणि गावातील पहारेकरी म्हणून सैन्याचे प्रमुख सहकारी असलेले भिल्ल इ.स. १८०२ मध्ये मोठ्या टोळ्यांमध्ये एकत्र आले, त्यांनी डोंगरावर वस्ती केली आणि दुष्काळ संपल्यावर त्यांनी गावांमध्ये श्रीमंत लोकांची लुटमार सुरु केली. अश्या घरभेदी लोकांविरुध्द लढताना कोणतीही दयामाया दाखवून चालणार नव्हती.  पेशव्यांनी खानदेश आणि बागलाणात शांतता आणि सुव्यवस्था रहावी यासाठी सरसुभेदार बाळाजी सखाराम यांना नियुक्त केले होते. मनोहर गिरी गोसावी नावाच्या एका व्यक्तीच्या मध्यस्थीने, बाळाजीने अहमदनगरमधील कोपरगाव येथे भिल्लांच्या एका टोळीला भेटण्यास बोलावले, त्यांना विश्वासघाताने पकडून विहिरींमध्ये फेकून दिले आणि यामुळे काही काळासाठी चांदवड पर्वतरांगाच्या दक्षिणेकडील प्रदेशात शांतता प्रस्थापित झाली. 

इ.स. १८०६ मध्ये, अहमदनगरमधील घेवरी चांदगाव येथे आणि खानदेशच्या वेगवेगळ्या भागात अनेक भिल्लांचे हत्याकांड झाले. जेव्हा पुन्हा अशांतता निर्माण झाली, तेव्हा या परिस्थितीवर नियंत्रण मिळवण्यासाठी सरदार त्र्यंबकजी डेंगळें यांच्याकडे हि मोहीम सोपवण्यात आले. त्यानी ५००० ते ६००० घोडेस्वार आणि मोठ्या प्रमाणात पायदळ घेउन कळंबचा प्रमुख नरोबा तकित याला पाठवले आणि गोदावरी  नदीच्या आजुबाजुच्या परिसरातील भिल्ल बंडखोरांचा बिमोड करण्याचे आदेश दिले. नरोबाला जिथे जिथे भिल्ल सापडले तिथे त्यांची कत्तल करण्यात आली आणि पंधरा महिन्यांत सुमारे पंधरा हजारांची कत्तल करण्यात आली असे म्हटले जाते. मात्र इतके करुनही भिल्ल लोकांची बंडखोरी कमी झाली नाही. सत्रकार आपले रक्षण करण्यासाठी असमर्थ आहे असे लक्षात आल्यावर सरदार आणि मोठ्या जमीनदारांनी अरब भाडोत्री सैनिकांना मदत घेतली. अर्थातच हा उपाय खर्चिक होता. अरब लोकांनी या परिस्थितीचा फायदा घेत आपले वेतन वाचवून आणि पैसे लोकांना व्याजाने देत, जणु ते या परिसरातील मुख्य सावकार बनले आणि त्यांच्या मालकांकडून आणि सामान्य जनतेकडून मोठ्या प्रमाणात खंडणी वसूल करु लागले. भिल्ल लुटारू आणि अरब व्याजदारांव्यतिरिक्त, या भागातील शासकीय अधिकाऱ्यांच्या जप्तीचा आणि अन्यायाचा देखील सामना करावा लागला, वर्षभर शेतात राबून जे काही धान्य येइ किंवा शेतीचा महसूल सरकारजमा कारावा लागे त्या कामात लोकांकडून पैसे उकळण्याच्या  प्रयत्नांमध्ये सरकारी अधिकारी कोणतीही कसर सोडत नव्हते. शेतकर्यांना महसूल जमा करण्याव्यतिरिक्त, दिवाणी आणि फौजदारी खटल्यात न्याय मिळावा यासाठी याच सराकारी अधिकार्यांकडे जाण्याशिवाय पर्याय नसे. जोपर्यंत शेतकरी लाचेची रक्कम देत नाही तोपर्यंत कोणत्याही स्थानिक तक्रारींवर सुनावणी होऊ शकत नव्हती. न्यायाची खुलेआम खरेदी-विक्री होत असे आणि लोकांना भिल्लांपेक्षा मामलतदाराकडून जास्त त्रास सहन करावा लागत असे. इ.स. १८१६ मध्ये, गंगाधर शास्त्रींच्या हत्येसाठी ठाणे किल्ल्यातील तुरुंगात टाकण्यात आलेले त्र्यंबकजी डेंगळे पळून गेले आणि अहमदनगर, नाशिक आणि खानदेशच्या डोंगररांगांमध्ये भटकत राहिले, त्यांनी जंगली जमातींना उत्तेजन देउन पेशवे दुसरा बाजीराव यांच्यासोबत राहून इंग्रजांशी युद्धाची तयारी केली. मात्र त्याचवेळी पेंढारीं लोकांनी त्रास देण्यास सुरुवात केली आणि  इ.स.१८१७ ऑक्टोबर मध्ये, शिरूर येथे कमांडर असलेला जनरल स्मिथ चांदवड पर्वतरांगेतील खिंडीं ताब्यात घेण्यासाठी निघाला. दरम्यान, इंग्रजांविरुद्धचा शेवटच्या मराठा लढाईची सुरवात ५ नोव्हेंबर १८१७ रोजी, पेशव्यांनी इंग्रजांविरुद्ध घोषणा केली, नागपूरच्या रघुजी भोसले, शिंदे, होळकर सरदार एकत्र आले.यावेळी तुलसीबाई यांच्या विरोधाला न जुमानता, होळकरांच्या मंत्र्यांनी आणि सेनापतींनी बा़जीरावाच्या गोटात सामील होण्याचा निर्णय घेतला. शिप्राच्या काठावर राणीमाता तुलसीबाईंना पकडून त्यांचा इंग्रजांनी शिरच्छेद केला दुसर्या बाजीरावाने २६,००० सैन्यासह दक्षिणेकडे कूच सुरू केली. २१ डिसेंबर १८१७ रोजी, त्यांना महिदपूर येथे सर जॉन माल्कम आणि सर थॉमस हिस्लॉप यांनी रोखले, जे त्यावेळी पेंढारी नेता छुट्टू किंवा चिटूचा यानेही होळकरांच्या सैन्याचा पाठलाग केला आणि लढाईत होळकरांचा पराभव झाला. या पराभवानंतर लगेचच झालेल्या मंदसौरच्या करारानुसार, होळकरानी नाशिकच्या उत्तरेकडील बागलाणासह खानदेशाचा प्रदेश ब्रिटिशांना दिला.

 ब्रिटिश कालखंड ( इ.स. १८१८-१८८१ ) :-

      पंढरपूरच्या उत्तरेस सुमारे पंधरा मैलांवर असलेल्या आष्टा येथे पेशव्यांचे सेनापती बापू गोखला यांचा इंग्रजांनी पराभव केला आणि त्याच्या मृत्यूनंतर (१९ फेब्रुवारी १८१८) जनरल स्मिथने पेशव्यांचा पाठलाग करण्यासाठी शिरूरकडे कूच केले. बाजीराव काही काळ कोपरगाव येथे राहिला, जिथे त्याला होळकरांचा सेनापती सामील झाला आणि त्याच्या बाजुला असलेले सरादार पटवर्धन त्याला सोडून गेले. कोपरगावहून तो उत्तरेकडे चांदवडकडे माघार घेत निघाला, परंतु सर थॉमस हिस्लॉपच्या नेतृत्वाखालील ब्रिटिश सैन्य जवळ येत असल्याचे ऐकून तो कोपरगावकडे परतला आणि पूर्वेकडे पळून गेला. मे महिन्यात असीरगडजवळ ढोलकोट येथे त्याने आत्मसमर्पण केले.  इ.स. ७ मार्च १८१८ रोजी, खानदेशातील थाळनेर येथे सर थॉमस हिस्लॉप यांनी केलेल्या सैनिकी कारवाईमुळे चांदवड येथील होळकरांच्या किल्लेदाराने संघर्ष न करता किल्ला सोडून दिला. गाळणा येथेही किल्लेदाराने किल्ला सोडला जो नंतर स्थानिक लोकांनी ताब्यात घेतला, मार्च १८१८ च्या अखेरीस, होळकरांच्या ताब्यातील नाशिकचा सर्व प्रदेश ब्रिटिशांकडे गेला. काही किल्ले अजूनही पेशव्यांच्या सैन्यदलाच्या ताब्यात असल्याने, लेफ्टनंट-कर्नल मॅकडॉवेलने औरंगाबादवरुन त्यांना ताब्यात घेण्यासाठी कूच केले. ब्रिटीश सैम्य येवल्याच्या उत्तरेस सुमारे दहा मैलांवर अंकाई-टंकाई, येथे ३ एप्रिल १८१८ रोजी पोहोचले, त्यांना कोणत्याही विरोधाशिवाय हे गड जिंकता आले. 








अंकाई-टंकाई येथून सैन्य चांदवडच्या उत्तरेस सुमारे दहा मैलांवर असलेल्या सातमाळा रांगेतील राजदेर या गडाच्या पायथ्याशी गेले. ९ एप्रिल रोजी, सैन्यदलाने शरण येण्यास नकार दिल्याने, लेफ्टनंट-कर्नल मॅकडॉवेलने हल्ला करण्यासाठी किल्ल्यापासून सुमारे दोन मैल अंतरावर एक स्थान निश्चित केले तर लेफ्टनंट डेव्हिस यांने ब्रिटीश सैन्य तैनात केले. इंग्रजांची हि हालचाल सुरु असतानाच मराठ्यांचे सैन्य मोठ्या प्रमाणात गडाच्या तटबंदीवर जमा झाले आणि त्यांनी गडाच्या उतारावरुन इंग्रज सैन्यावर हल्ला चढवला. अगदी गवत कापण्याचे विळे वापरुन प्रतिकार झाला. दुसऱ्या दिवशी सकाळी मेजर अँड्र्यूजच्या नेतृत्वाखाली १८० युरोपियन आणि ८०० स्थानिक सैनिकांचा एक तुकडी गडावर चढली, वाटेत असणार्या पहिल्या आणि दुसऱ्या टेकड्या जिंकल्या आणि दुसऱ्या टेकडीच्या बाजूला आश्रय घेउन इंग्रज सैन्याने राजदेहेरवरुन होणार्या तोफांच्या मार्यापासून स्वतःचा बचाव केला. याचवेळी इंग्रजांच्या चौकीवरुन गडावर जो काही तोफा आणि हॉवित्झर तोफांचा मारा केला गेला त्याचा फारसा परिणाम झाला नाही.
 मेजर अँड्र्यूजच्या नेतृत्वाखालील सैन्य आता हल्ला करण्यासाठी त्यांच्या आश्रयावरून हलले आणि मात्र त्याचवेळी वरच्या किल्ल्यांवरून तोफ आणि गोळ्याच्या जोरदार मारा आणि खालच्या बाजुने इंग्रजांच्या गोळ्यांच्या मार्यात एक मैल अतिशय कठीण आणि उंच गडाच्या कड्याच्या बाजूला चढून गेले, मात्र राजदेहेरवरील सैन्यातील एक तुकडीचा मुख्य आणि काही सैनिक जखमी झाले. संपूर्ण दिवसभर, गडावर त्याने काही तोफा आणि शेकडो बंदूकीच्या गोळ्यांमधून सतत चालु ठेवला. गडावरुन देखील प्रखर प्रतिकार सुरु असताना, लेफ्टनंट डेव्हिसने सैन्याच्या मदतीने मारा करणारा तोफखाना सज्ज करण्याचे काम सुरू केले. संध्याकाळच्या सुमारास, तोफखाना जवळजवळ पूर्ण सज्ज झालेले पाहून मराठ्यांनी युद्धबंदीचा झेंडा फडकावला. काही वेळातच दोन अधिकारी खाली आले आणि मेजर अँड्र्यूजने गॅरिसनला त्यांच्या खाजगी मालमत्तेसह आणि शस्त्रांसह गड खाली करुन निघून जाण्यास सहमती दर्शविली. मराठा सरदार किल्ल्यावर परतले, तेव्हा अचानक स्फोट झाला आणि आगीचा भडका संपूर्ण किल्ल्याच्या इमारतींमध्ये पसरला. एका शक्यतेनुसार, किल्लेदार आणि मुख्य अधिकाऱ्यामधील वादाचा परिणाम म्हणून हा स्फोट झाला होता, परंतु कदाचित तो अपघात असावा. गडावरच्या तोफखान्याचे बरेच जण आधीच दुसर्या मार्गावरून निघून गेले होते, परंतु कुटुंबियांना गडावरुन जाणारे लोक गडाच्या मुख्य प्रवेशद्वाराच्या मार्गाने खाली आले. गडावरचे सैन्य निघून गेल्यावर,इंग्रज शिपायांनी गडाचा ताबा घेतला.गडावरील अवशेषांमध्ये सुमारे रु. ५०,००० मोहरा सापडल्या. राजदेहेरच्या ताब्यात घेतल्याची बातमी कळताच, इंद्राई आणि परिसरातील इतर अनेक किल्ले प्रतिकार न करता इंग्रजांना मिळाले. त्यानंतर ही तुकडी चांदवडहून नाशिककडे निघाली, सुमारे पस्तीस मैलांचे अंतर, नाशिकचे वर्णन इंग्रजांनी विशेष उल्लेखनीय केले आहे. 



भारतातील कोणत्याही जागेइतकेच सौंदर्यपुर्ण परिसर आणि सुपीकता असलेल्या प्रदेश,पाण्याने भरलेल्या विहिरींनी समृद्ध, मैदानी प्रदेश, दाट लोकवस्ती असलेली गावे आणि मोठ्या आंब्याच्या बागांनी वेढलेला. द्राक्षमळ्यांनी समृद्ध असलेले एक मोठे शहर म्हणजे नाशिक. या नाशिकच्या अधिकार्यांनी १९ एप्रिल रोजी शांतपणे शरणागती पत्करली, त्याच्यानंतर काही दिवसांनी त्र्यंबकगड शरण आला. नाशिकहून इंग्रजांची तुकडी नैऋत्येकडे सुमारे पंचवीस मैल त्र्यंबकला कूच करत २३ एप्रिल रोजी पोहोचली. त्रिंबकगडाचा 'प्रचंड घेरा आणि आजुबाजुच्या परिसराचे' निरीक्षण केल्यानंतर, लेफ्टनंट डेव्हिसने ईशान्य बाजुला  आपला तळ उभारण्याचा निर्णय घेतला जिथे जमीन सपाट आणि तोफखाना उभारण्यासाठी अनुकूल होती. परंतु गड माथ्यावर पोहोचण्याचा एकमेव मार्ग अरुंद आणि वळणदार पायऱ्यांवर होता, ज्या खडकात खोदलेल्या होत्या आणि एका वेळी एका माणसाला जाण्या इतकी कमी जागा होती. मराठ्यांनी गडावरुन तोफा उडवल्या आणि इंग्रजांना मागे हटण्यास भाग पाडले, ज्यामध्ये तीन शिपाई मारले गेले आणि काही जखमी झाले.गडाच्या पायथ्याखाली असलेले त्र्यंबक गाव संध्याकाळी इंग्रज फौजांकडून ताब्यात घेण्यात आले आणि रात्रीच्या वेळी काही हॉवित्झर तोफांसह दोन मोठ्या तोफा तोफखान्यामध्ये तैनात करण्यात आल्या.  पुढील (२४ तारखेला) सकाळी पहाटे गडावर गोळीबार सुरू करण्यात आला आणि दिवसभर तोफांचा मारा सुरूच राहिला परंतु त्याचा फारसा परिणाम झाला नाही. दरम्यान,गडावरच्या सैन्याचे लक्ष प्रवेशद्वाराकडून दुसरीकडे लक्ष वेधण्यासाठी दोन सिक्स-पाउंडर तोफां घेउन सैनिकांची एक तुकडी टेकडीच्या दुसऱ्या बाजूला पाठवण्यात आली. तिसऱ्या दिवशी दुपारच्या सुमारास,मराठा सैन्याचा गोळीबार थांबला आणि खुप वेळ गडावर कोणीही दिसले नाही. गडावरचे सैन्य माघार घेत असल्याचे तसेच समेट करण्याच्या स्थितीत आले असे इंग्रजांना वाटले. म्हणून लेफ्टनंट-कर्नल मॅकडॉवेलने गडाच्या पायथ्याशी असलेल्या परिसराचा आणि ढिगाऱ्याचा ताबा मिळविण्यासाठी  युरोपियन आणि भारतीय शिपायांच्या एका छोट्या तुकडीला गडाच्या उतारावर चढून तो भाग ताब्यात घेण्यासाठी उजवीकडे जाण्याचे आदेश दिले. मात्र सैन्याच्या प्रमुखाने शिपायांची तुकडी थेट कड्याच्या पायथ्याशी, गडावरील खिंडीच्या प्रवेशद्वारापर्यंत नेला. तिथे त्याला तोफगोळे आणि गोळ्यांचा इतका भयंकर मारा झाला आणि दगडांचा इतका वर्षाव झाला की सात किंवा आठ जण ठार झाले आणि सुमारे तीस जण गंभीर जखमी झाले. उर्वरित लोकांनी परिसराचा ताबा घेतला, जोरदार गोळीबार झाला तरी इंग्रजांना घरांच्या अवशेषांमध्ये आणि झाडांच्या मागे लपून रहाण्यायोग्य आश्रय मिळाला. २२ एप्रिल १८१८ रोजी इंग्रजांच्या सैन्याने त्र्यंबकेश्वराच्या किल्ल्याला वेढा दिला. त्या वेळी किल्ल्यावर सुमारे ५५० शिपाई आणि २५ तोफा होत्या. त्यांनी किल्ल्याच्या सभोवतालच्या जागांची साऱ्या दिवसभर टेहळणी करून झाल्यावर २२ एप्रिल रोजी किल्ल्याच्या दक्षिण दरवाज्याच्या समोर एक नाके बसविले. त्याचप्रमाणे वायव्य बाजूस असणाऱ्या दरवाज्यावर गोळा टाकता येईल अशा मारगिरीच्या जागा तयार केल्या. २४ एप्रिल पासून किल्ल्यावर तोफांचा भडिमार सुरू करण्यात आला. त्रिंबक गावाच्या वर डोंगरात एक लहानसे खेडे आहे, तिथे त्यांनी एक नाके बसविण्याचा प्रयत्न केला, मात्र त्यावर मराठ्यांनी जोराचा मारा केल्यामुळे इंग्रजांना तो नाद सोडून द्यावा लागला. २४ एप्रिलला रात्रभर ब्रिटिशांनी किल्ल्यावर तोफांचा भडिमार चालूच ठेवला, त्यामुळे दुसऱ्या दिवशी त्रिंबकच्या किल्लेदाराला किल्ला सोडून खाली यावे लागले आणि इथे वाटाघाटीस तोंड फुटले. किल्ल्यातील शिबंदीला स्वतःचे शस्त्र आणि संपत्ती घेऊन जाण्याची परवानगी देण्यात आली. ज्या वेळी किल्ल्याचा दरवाजा उघडला, त्या वेळी किल्ल्यातून ५२८ माणसे बाहेर पडली. त्यांत मराठा, रजपूत लोक तर होतेच, पण काही सिद्दी आणि अ‍ॅबसिनियन जातीचे लोकही होते. या सर्वांनी दक्षिण दरवाज्याने जावे अशी व्यवस्था करण्यात आली होती. ब्रिटिशांनी त्यांच्या मार्गात ठिकठिकाणी दगडांच्या राशी रचून ठेवल्या होत्या, ज्यामुळे हे सर्व लोक दुपारी तीनपूर्वी किल्ल्यातून बाहेर पडू शकणार नाहीत, अशी व्यवस्था करून ठेवली होती. या किल्ल्यात सुमारे २५ तोफा सापडल्या. किल्ला जिंकताना १३ युरोपियन आणि ९ भारतीय लोक ठार झाले. त्यांत दोन अधिकारीसुद्धा होते. किल्ल्यावरून ह्या तोफा खाली आणताना मात्र ब्रिटिशांची अडचण झाली. या सर्व खटाटोपामध्ये त्यांच्या तोफांच्या गाड्यांचे मोठे नुकसान झाले.
त्रिंबकगडाचा दुर्गभांडार परिसर
त्रिंबक दरवाजा

     त्रिंबकचा किल्ला ब्रिटिशांच्या ताब्यात गेल्यानंतर दोन महिन्यांनी मराठ्यांचा सेनापती त्रिंबकजी डेंगळे याने पुन्हा किल्ला जिंकण्याचा एक प्रयत्न केला, पण तो अयशस्वी ठरला. एके दिवशी सकाळी उत्तरेकडच्या दरवाज्यावर काही लोक आले आणि त्यांनी गोदावरी नदीची पूजा करायची असे सांगून आतमध्ये प्रवेश मिळवला. पण सर्वजण आत येण्यापूर्वी त्यांच्यापैकी एकाने दरवाज्याच्या रखवालदारावर हल्ला केला. पण तेव्हा त्या रखवालदाराने स्वतःचा प्राण धोक्यात घालून दरवाजा बंद केला आणि किल्ल्यातील लोकांना सावध केले, त्यामुळे बरेच लोक खाली राहिले. खालच्या लोकांवर वरच्या सैनिकांनी दगड-धोंड्यांचा मारा करून त्यांना पळवून लावले, त्यामुळे त्यांचा किल्ला घेण्याचा प्रयत्न असफल झाला. 
१४ एप्रिल १८१८ ला ब्रिटिशांनी त्र्यंबकचा किल्ला जिंकला आणि लेफ्टनंट मॅकडावेल खानदेश जिंकण्यासाठी पुढे निघाला. आता खानदेश जिंकायचे तर प्रथम त्याला खानदेशाचे नाक तर कापायलाच हवे, म्हणून मॅकडावेल मालेगावच्या किल्ल्यापाशी पोहोचला. तो दिवस होता १६ मे १८१८. या वेळी मालेगावसह खानदेशातील बहुसंख्य किल्ल्यांवर अरबांची सत्ता होती. हे सर्व अरब लढण्यात आणि स्वामिनिष्ठेमध्ये चिवट म्हणून प्रसिद्ध होते. कर्नल मॅकडावेलने मालेगावच्या किल्ल्यासमोर तळ दिला. त्या वेळचे किल्ल्याचे वर्णन असे या किल्ल्याला एकात एक अशा दोन भिंती आहेत. त्याच्या सभोवती पाण्याने भरलेला खंदक आहे. या खंदकाची खोली सुमारे ६ मीटर आहे. हा किल्ला आतून किती मोठा असावा याची बाहेरून शत्रूला कल्पना येणे शक्यच नव्हते. इंग्रजी सैन्यातील युरोपियन इंजिनिअरची मालेगाव वेढ्याच्या वेळी मोठी फसगत झाली होती. अनेक दिवसांच्या प्रयत्नानंतर अखेर मालेगावच्या किल्ल्याची तटबंदी एके ठिकाणी पडली. ती पाहून तेथून हल्ला करण्याकरिता लेफ्टनंट नॅटीस हा आपल्या लोकांसह आत गेला आणि आत शिरल्यावर त्याला समजले की, आत अजून एक १७ मीटर उंचीची मजबूत भिंत उभी आहे. या तटबंदीवरून अरबांनी ब्रिटिश सैन्यावर मारा केला आणि ब्रिटिशांना माघार घावी लागली.


मालेगावचा किल्ला

     १६ मे १८१८ रोजी कर्नल मॅकडावेल याची छावणी मालेगाव किल्ल्याच्या दक्षिणेला पडली. पण १७ मे रोजी त्याने ती तिथून काढून किल्ल्याला वळसा घालून उत्तर बाजूला मोसम नदीच्या किनाऱ्यावर टाकली. आता इथून किल्ल्यावर मारा करण्यासाठी मोर्चे बांधण्यात आले व तेथून तोफा डागून गोळीबार करण्यात आला. सुमारे ३५० अरबांना शरण येण्याचे आवाहन केले. त्यांनी नकार दिला इंग्रजांनी पुन्हा किल्ल्यावर हल्ला केला. तीन दिवसांपर्यंत अरबांनी निकराचा प्रतिकार केला पण बंदुकीच्या मार्याच्या जोरावर त्यांना मागे हटवण्यात आले. एका हल्ल्यात, मुख्य सैन्याधिकारी लेफ्टनंट डेव्हिस मारला गेला आणि युरोपियन रेजिमेंटचे नेतृत्व करणारा मेजर अँड्र्यूवा गंभीर जखमी झाला. किल्ल्याच्या पश्चिमेस काही झाडेझुडपे आहेत. त्यांच्या आश्रयाने एक बॅटरी चालू करून नदीच्या पात्राला समांतर असा खंदक खोदण्यात आला. या वेळी ब्रिटिश सैन्याला नवीन सैन्याची कुमक येऊन मिळाली. मग मात्र आत असणाऱ्या अरबांना परमेश्वराच्या कृपादृष्टीशिवाय कसलाच पर्याय उरला नव्हता. १६ मे १८१८ पासून २९ मे १८१८ पर्यंत चहुबाजूस मोर्चे बांधणे, खंदक खणणे, भिंतींवर तोफा डागणे वगैरे पूर्वतयारीची कामे केवळ पुढील चौदा दिवसांत करण्यात आली.२२ तारखेला, ५०० हिंदुस्थानी घोडदळ इंग्रज सैन्याला येउन मिळाले आणि वेढा घालणाऱ्या ब्रिटीश सैन्याला बळकटी मिळाली आणि दुसऱ्या दिवशी लेफ्टनंट हॉजेसच्या नेतृत्वाखाली रसेल ब्रिगेडच्या ४५० सैनिकांच्या पायदळाने वेढा घातला.या दरम्यान ब्रिटीश सैन्याच्या तोफा खूप खराब झाल्या होत्या आणि दारूगोळा जवळजवळ वाया गेला होता, त्यामुळे डागडुजीचा प्रयत्न करण्यात वेळ वाया गेला. २९ मे १८१८ रोजी पहाटे दीड हजार इंग्रज सैन्याने किल्ल्यावर हल्ला करायचा बेत आखला, पण त्यात त्यांना यश मिळाले नाही. आता नदीच्या उजव्या बाजूने हल्ला करुनही काही उपयोग होत नाही हे लक्षात आल्यावर, जूनच्या पहिल्या आठवड्यात इंग्रजांनी आपली फौज फिरवून नदीच्या पलीकडे गावाच्या बाजूला नेली. ५ जून १८१८ ला मालेगाव पेठेच्या बाजूने दोन हॅविट्झर तोफांच्या साह्याने किल्ल्यावर मारा सुरू करण्यात आला. या तोफांनासुद्धा किल्ल्याचे तटबुरूज मानत नव्हते. शेवटी ब्रिटिशांनी अहमदनगरला पत्र पाठवून नवीन तोफा मागविल्या. १० जून १८१८ रोजी १२ तोफा मालेगावला दाखल झाल्या. दुसऱ्याच दिवशी या तोफा मालेगावच्या किल्ल्यावर आग ओकू लागल्या. अंदाजे ११ वाजताच्या सुमारास दारूकोठारांना आग लागली आणि त्याच्या धक्क्याने किल्ल्याचा बाहेरचा तट कोसळला. आतमधील तट फोडण्यासाठी निरनिराळ्या जागेवरून अठरा पौंडांच्या तोफांचा मारा करण्यात आला मेजर ग्रीन हिलच्या पायाला जरी जखम झाली होती तरी तो भगदाड चढला आणि एक शिडी खाली सोडली, जी त्याच्या हातातून भिंतीच्या तळाशी पडली. यावर चडहून ब्रिटीश सैन्य किल्ल्यात शिरले. आणि अखेरीस १३ जूनला किल्ला इंग्रजांच्या हातात पडला. आतील किल्ल्याच्या एका बुरुजावर ब्रिटिश ध्वज फडकवण्यात आला.अरबांना सुरतला नेण्यात आले आणि सुरतहून अरबस्तानात पाठवण्यात आले. पण त्याआधी तीन ते चार हजार ब्रिटिश सैन्याला केवळ साडेतीनशे अरबांनी सुमारे महिनाभर जेरीस आणले. खरोखरच केवढा हा पराक्रम !


     गावातील काही लोकांच्या म्हणण्यानुसार हा किल्ला इंग्रजांनी काही प्रामाणिकपणे घेतला नाही. ते म्हणतात, हा किल्ला त्यांनी फितुरीनेच घेतला. यामागची कथा अशीः किल्ल्यातील दारूकोठारं कुठं आहेत याची नेमकी माहिती इंग्रजांना हवी होती. किल्ल्यात हजामतीसाठी एक न्हावी रोज जात असे. त्यास इंग्रजांनी फितूर करून घेतले. त्याने किल्ल्यात जाऊन दारुकोठार जिथे असेल तिथून कापडाचे निशाण फडकवायचे म्हणजे बरोबर त्या जागेवर ब्रिटिश लोक तोफा डागणार. यानुसार सर्व घडले आणि दारूकोठाराने पेट घेतला व किल्ला पडला. पण या कथेमध्ये फारसे तथ्य नाही.
     या कालावधीत त्रिंबकजी डेंगळेंनी त्र्यंबक किल्ल्या जिंकून घेण्याचा जवळपास यशस्वी प्रयत्न केला होता, ते चांदवडजवळच्या अहिरगावच्या लपले असल्याची बातमी इंग्रजांना मिळाली. कॅप्टन स्वान्स्टनच्या नेतृत्वाखाली मालेगावहून पाठवलेल्या सैन्याच्या एका तुकडीने २९ जून १८१८ रोजी गावाला वेढा घातला, दरवाजे तोडले आणि पेंढ्याच्या ढिगाऱ्याखाली लपलेल्या त्र्यंबकजीला पकडले. 
३ जुलै रोजी मुल्हेर किल्ला ब्रिटीशांनी ताब्यात घेतला आणि पूर्ण नाशिक जिल्हा खर्या अर्थाने इंग्रजांचा गुलाम झाला. चांदवड डोंगररांगेच्या उत्तरेकडील जिंकलेला प्रदेश खानदेशात आणि दक्षिणेकडील प्रदेश अहमदनगर विभागामध्ये समाविष्ट करण्यात आला. चांदवडच्या दक्षिणेकडील प्रदेशात सुव्यवस्था निर्माण करण्यत फारश्या अडचणीने आल्या नाहीत. सततच्या लढायांनी या भागातील लोक त्रासून गेले होते. त्यामुळे त्यांनी इंग्रजांची सत्ता निमुटपणे मान्य केली. पेशव्यांचे सैन्यातील लोक युध्द संपल्यामुळे आपआपल्या गावी जाउन नेहमीच्या कामाला लागले. डोंगरी किल्ल्याचा फायदा घेउन पुन्हा बंड होउ नये यासाठी इंग्रजांनी किल्ले उध्वस्त केले किंवा त्यावर जाणर्या वाटा नष्ट केल्या. तसेच इत्तदेशीयांचे सैन्य आणि लष्करी बळ हळूहळू कमी करण्यात आले. यानंतर बंडखोर भिल्ल आणि कोळी सरदारांविरुद्द मोहिम उघडण्यात आली. सह्याद्रीच्या परिसरातील म्हणजे पश्चिमेकडील भिल्ल पटकन शरण आले आणि त्यांचे पुनर्व्सन करण्यासाठी त्यांना अर्थसहाय्य आणि काही गावाजवळच्या जमीनी देण्यात आल्या. मात्र बागलाणच्या उत्तर आणि पूर्वेकडे भिल्ल लोक दक्षिणेपेक्षा जास्त संख्येने होते. या टोळ्यांचे नेतृत्व पेंट आणि अभोना हे शक्तिशाली सरदार करत होते त्यांनी खूप त्रास दिला. मैदानी प्रदेशातील भिल्लांचा तातडीने बंदोबस्त करणे शक्य झाले. मात्र  डोंगरांळ प्रदेशाय लपलेल्या टोळ्यांना नियंत्रणात आणणे हे खरे आव्हन होते.यासाठी इंग्रजांनी मालेगावच्या लष्करी छावणीत मोठ्या सैन्याची जमवाजमव करुन डोंगराळ भागात गस्त घालण्यात आली आणि सापडलेल्या गुन्हेगारांना कठोर शिक्षा देण्यात आल्या. भिल्लांचे पुनर्वसन व्हावे यासाठी चाळीसगावच्या दक्षिणेस सुमारे पंधरा मैल अंतरावर सातमाळा रांगेतील कन्हेरागडाच्या पायथ्याशी वसाहत उभारुन तिथे भिल्ल-पुरुषांना  स्थायिक होण्यासाठी प्रलोभने देण्यात आली. स्थायिक होणाऱ्या सर्वांना रोख रक्कम आणि भाडे पट्ट्यावर जमीन देण्यात आली आणि  खिंडीचे रक्षण करीत असलेल्या भिल्ल सरदारांना भत्ते देण्यात आले. दरोडेखोराचे बेभरवशाचे आयुष्य जगण्यापेक्षा  भिल्लांना शेती करुन स्थिरस्थावर जीवन जगण्याची संधी देण्यात आली. मात्र शेतीचे काम करण्याचा आळस आणि स्थिर आयुष्य जगण्याची सवय नसल्यामुळे सुरवातीला भिल्ल लोकांचा या योजनेला प्रतिसाद मिळाला नाही. मात्र या भागात अधिकारी म्हणून १८२५ मध्ये आलेल्या सर जेम्स औट्रम यांना भिल्ल जमातीच्या मानसिकते बद्दल आणि जीवनशैलीची उत्तम जाण असल्यामुळे त्याने केलेल्या प्रयत्नामुळे भिल्ल लोकांनी जुन्या वाईट सवयी सोडून शांत आणि स्थिर आयुष्य जगायला मान्यता दिली. त्यामुळे डोंगराळ भागात देखील शांतता प्रस्थापित झाली.

१८५७-१८५९ चा उठाव :-

      ब्रिटिश राजवटीच्या स्थापनेपासून नाशिकमध्ये गंभीर दंगल घडली ती १८४३ मध्ये काही युरोपीय लोकांनी गायीची कत्तल केल्याने !आणि अर्थातच १८५७ मध्येही जो राष्ट्रीय उठाव झाला त्याचे पडसाद नाशिक परिसरात उमटले. १८५७ च्या बंडखोरी दरम्यान, नाशिकमध्ये मोठ्या प्रमाणात अशांतता निर्माण झाली.काही बंडखोर कोळी, अरब आणि ठाकूर होते, परंतु बंडखोरांपैकी बहुतेक  नाशिकच्या दक्षिण भागातील आणि अहमदनगरच्या  उत्तर भागातील भिल्ल लोक होते,   सुमारे ७००० च्या संख्येने असलेल्या या भिल्लांच्या सैन्याचे नेतृत्व काही भिल्ल सरदारांनी आणि अंशतः ब्राह्मण पुढार्यानी केले. सहाजिकच  निजामच्या सैन्याच्या हल्ल्यांपासून सीमाभागाचे रक्षण करण्यासाठी आणि भिल्लांच्या उपद्रवापासून  मोठ्या शहरांचे रक्षण करण्यासाठी   सैन्याच्या तुकड्या तैनात करण्यात आल्या होत्या. परंतु भिल्लांचे संघटन तोडण्याचे आणि बंडखोरांचा शोध घेण्याचे काम पूर्णपणे शिपायांवर सोपवण्यात आले होते, त्यांनी बंडखोरांवर कारवाई करण्यासाठी विशेष कोळी दलाची स्थापना केली, ज्याला पायदळ आणि घोडदळाच्या तुकड्यांद्वारे बळकटी देण्यात आली. भिल्ल आणि काही त्र्यंबक भागातील ब्राह्मण वगळता, हे बंड इतर लोकांत पसरले नाही आणि त्यामुळे विशेष कोणत्याही दडपशाहीच्या उपाययोजनांची आवश्यकता पडली नाही.


          भिल्लांचा या उठावाचे नेतृत्व केले ते  भागोजी नाईक यांनी ! भागोजी नाईक हे  पूर्वी अहमदनगर शिपाई दलामध्ये  प्रमुख पदावर होते. मात्र  १८५५ मध्ये त्यांनी दंगल घडवून आणली आणि ब्रिटीश सरकारने पोलिसांना अडथळा आणणे आणि धमकावणे या आरोपाखाली दोषी ठरले होते आणि त्यांना तुरुंगवासाची शिक्षा सुनावण्यात आली होती. त्यांना त्यांच्या चांगल्या वर्तनासाठी एक वर्षाची सुट देउन त्यांची सुटका करण्यात आली. सुटकेनंतर शस्त्र बाळगायचे नाही अशी अट असल्यामुळे भागोजींनी सिन्नर जवळील त्यांचे गाव नांदूर शिंगोटे सोडले. मात्र भागोजी एक प्रभावशाली व्यक्ती असल्याने लवकरच त्याना सुमारे पन्नास जण सामील झाले आणि त्यांनी त्याच्या गावापासून सुमारे एक मैल अंतरावर असलेल्या एका डोंगराचा आश्रय घेतला, हा डोगर पुणे-नाशिक रस्त्याच्या बाजुलाच होता. भागोजींचा बंदोबस्त करण्यासाठी (४ ऑक्टोबर १८५७ ला शिपाई दळाचे प्रमुख  लेफ्टनंट जे. डब्ल्यू. हेन्री, नांदूर शिंगोटे येथे आला आणि त्यांच्यासोबत त्यांचा सहाय्यक, म्हणून लेफ्टनंट कर्नल, टी. थॅचर आणि निरीक्षक. ए. एल. टेलर होते. 
लेफ्टनंट हेन्रीच्या नेतृत्वाखालील पोलिस दलात तीस शिपाई आणि तलवारींनी सज्ज असलेले वीस महसूल दलातील् शिपाई होते. लेफ्टनंट हेन्रीने संगमनेर आणि सिन्नरच्या मामलतदारांना मध्यस्थी करुन भागोजींना बोलावून त्यांना शरण येण्यास भागोजींना सांगितले. मात्र भागोजींनी दोन वर्षांचा बाकी राहिलेला पगार मिळाल्याशिवाय आणि त्यांच्या रोजगाराची काही व्यवस्था केल्याशिवाय शरण येण्यास नकार दिला. भागोजींनी शरण येण्यास नकार दिल्यामुळे इंग्रज सैन्य त्यांना अटक करण्यासाठी पुढे सरसावले. मात्र भागोजीच्या सैन्याने प्रत्युत्तरादाखल केलेल्या गोळीबारात पहिल्या गोळीने लेफ्टनंट हेन्रीच्या मागचा एक माणूस ठार झाला. म्हणून इंग्रज अधिकारी डोंगरावरुन खाली उतरु लागले, परंतु ते माघारी जाण्यापूर्वीच त्यांच्यावर गोळीबार झाला आणि लेफ्टनंट हेन्री जखमी झाला. तो पुन्हा सावरला आणि पुढे सरकताच त्याच्या छातीत गोळीने एक प्राणघातक जखम झाली. लेफ्टनंट थॅचरच्या नेतृत्वाखाली हल्ला सुरूच राहिला आणि भिल्लांनी माघार घेतली.मात्र या संघर्षामुळे संपूर्ण भिल्ल जमातीत अस्वस्थता पसरली. अहमदनगरच्या राहुरी परिसरातील पुथरजी नाईक नावाच्या एका व्यक्तीने सुमारे १०० भिल्लांची एक नवीन टोळी उभारली, परंतु लेफ्टनंट-जनरल मॉन्टगोमेरीने त्यांना पांगवले. १८ ऑक्टोबर रोजी अहमदनगरमधील समशेरपूरच्या डोंगरावर भागोजीच्या माणसांसोबत २६ व्या नेटिव्ह इन्फंट्रीच्या कर्नल मॅकन यांच्या नेतृत्वाखाली भिल्ल सैन्य आणि ब्रिटीश पोलिसांच्या तुकडीमध्ये एक लढाई झाली, ज्यामध्ये विशेष पोलिस ड्युटीवर असलेले लेफ्टनंट ग्राहम आणि सैन्यासोबत असलेले प्रशासकीय अधिकारी  एफ. एस. चॅपमन जखमी झाले. २० जानेवारी १८५८ रोजी मनमाड परिसरातील नांदगावमधील मांडवदजवळ, एका अज्ञात नेत्याच्या नेतृत्वाखाली भिल्ल, रोहिला आणि अरबांच्या मोठ्या जमावाने मेजर मॉन्टगोमेरीच्या सैन्यावर हल्ला केला. भिल्ल, रोहिल्यांचा जमाव दाट झाडीमध्ये लपलेले होते, तिथून त्यांनी पुढे जाणाऱ्या सैन्याला गोळ्या घालून ठार मारले आणि मेजर मॉन्टगोमेरी गंभीर जखमी झाले आणि त्यांच्या सैनिकांना मोठ्या प्रमाणात हानी होउन माघार घ्यावी लागली. पुढच्या हल्ल्यात लेफ्टनंट स्टुअर्ट प्राणघातक जखमी झाले. त्यानंतर लेफ्टनंट थॅचरने सैन्य मागे घेतले. ब्रिटिश सैन्याची मोठी हानी झाली. दहा ब्रिटीश सैनिक ठार आणि पन्नास जखमीं झाले, मृतांपैकी एक आणि जखमींपैकी तीन युरोपियन अधिकारी होते.  भिल्लांच्या टोळ्यामुळे अराजकता वाढू लागल्याने,लेफ्टनंट ग्राहम याच्यानंतर अधिकारी बनलेल्या कर्नल, नट्टल, याला भिल्लांचे वंशपरंपरागत प्रतिस्पर्धी कोळी लोकांची एक तुकडी उभारण्याचा आदेश देण्यात आला. कोळी लोक मराठा काळात मावळ्यांच्या किंवा सैन्यामध्ये असायचे. या तुकडीची भरती प्रामुख्याने जुन्नर, अहमदनगरमधील अकोला आणि नाशिक या डोंगराळ भागात करण्यात आली. डिसेंबर १८५७ मध्ये, स्वतःच्या तलवारी आणि बंदुकांनी सज्ज असलेले शंभर कोळी सैनिकांची तुकडी युद्धासाठी सज्ज करण्यात आली आणि त्यांनी त्यांची उपयुक्तता इतकी सिद्ध केली की, जानेवारी आणि फेब्रुवारी १८५८ मध्ये, ११० जणांची दुसरी तुकडी तयार करण्याची मागणी झाली आणि त्यानंतर लवकरच, कमांडंट आणि सैन्याधिकार्यासह तुकडीतील शिपायांची संख्या ६०० पर्यंत वाढवण्यात आली.  सैन्याच्या जातीप्रमाणे तुकड्या उभारताना कॅप्टन नट्टल यांनी वेगवेगळ्या जातीच्या प्रमुखांशी चर्चा केली आणि त्यांना भरती होणाऱ्या सैनिकांच्या संख्येनुसार तुकडीमध्ये पद आणि स्थान देण्याचे आश्वासन दिले. बामला कुळाचा प्रमुख जावजी नाईक बामला याला सैन्यदलाचा प्रमुख बनवण्यात आले आणि क्रांतिकारक राघोजी भांगरे यांच्या भाऊ आणि इतर मुखियांना सैन्याधिकारी म्हणून निवडण्यात आले. अहमदनगर पोलिसांकडून कवायतीसाठी अधिकारी घेण्यात आला आणि फारशी विश्रांती न घेता, कोळी लोकांनी जन्मजात सैनिकांसारख्या सहजतेने कवायतीत प्रभुत्व मिळवले आणि डोंगरांळ आणि दुर्गम प्रदेशात यशस्वी लढाया करुन स्वतःला सिद्ध केले. या सैनिकांकडे संगीन असलेल्या बंदूका शस्त्र म्हणून होत्या, त्यांचा पोषाख म्हणजे काळ्या चामड्याचे कपडे, गडद हिरव्या रंगाच्या पगड्या, गडद हिरव्या कापडाचे अंगरखे, गुडघ्यापर्यंत घातलेले गडद लाल रंगाचा झगा आणि सँडल असा होता  ते तंबू किंवा सामानाशिवाय कूच करत होते. प्रत्येक शिपाई त्यांचे संपूर्ण सामान पाठीवरच्या पिशवीत आणि हलक्या पिठ्ठमध्ये हलक्या नेई.  हे लोक चिवट होते आणि अतिशय शिस्तबध्द हालचाली करत. अगदी दुर्गम भागातून देखील एका दिवसात तीस किंवा चाळीस मैल कूच करत असत, तसेच बरोबर त्यांची शस्त्रे, दारूगोळा, सामान आणि अन्न घेऊन जात होते. हे शिपाई नेहमीच उत्साही, स्वच्छ रहाणी आणि वागण्यात व्यवस्थित होते, कितीही लांबचा पल्ला गाठायचा असला तरी त्यांचे बंदुका नेहमीच सज्जा आणि चांगल्या स्थितीत ठेवत. कधीकधी शत्रुबरोबर लढताना मोठ्या अडचणीं आल्या तरी, त्यांनी धाडस आणि चिकाटी दाखवली.भिल्ल लोकांचा उठाव सुरुच होता.  भिल्ल टोळ्या सुरगाणा परिसराच्या प्रमुख सरदाराला त्यांच्यात सामील होण्यासाठी प्रवृत्त करण्याचा प्रयत्न करत होते. म्हणून त्याचा बीमोड करण्यासाठी ३ डिसेंबर रोजी, कॅप्टन नट्टल, १६० जणांची तुकडी आणि पन्नास घोड्यांच्या सैन्यासह, अकोल्याहून सुरगाण्याकडे निघाला. सुलगानाकडे जाताना, बातमी आली की आदल्या रात्री ६ डिसेंबरला भिल्ल आणि ठाकूरांच्या एका गटाने त्र्यंबकच्या तिजोरीवर हल्ला केला आहे आणि उठावात भाग घेतलेले काही लोक त्र्यंबकच्या आसपासच्या डोंगरात आहेत. त्रिंबकच्या डोंगरात शोध घेण्यात आला आणि काही लोकांना पकडण्यात आले, कैदी बनवण्यात आलेल्या लोकांमध्ये, पांडू नावाच्या एका ठाकूरने या उद्रेकात आपला सहभाग असल्याचे कबूल केले आणि सांगितले की तो आणि त्याचे लोकांनी एका त्र्यंबक ब्राह्मणाच्या सल्ल्याने उठाव केला होते, त्या त्रिंबकच्या व्यक्तीला पुन्हा पाहिल्यास तो ओळखू शकेल आणि सरकारॉ अधोकार्याला दाखवू शकेल.पकडलेल्या लोकांपैकी दुसऱ्या एका कैद्याने या गोष्तीची पुष्टी केली आणि त्या व्यक्तीला शोधून देण्याचे आश्वासन दिले. त्र्यंबकला पोहोचल्यावर, कॅप्टन नट्टलची जिल्ह्याचा प्रभारी प्रशासकीय अधिकारी चॅपमन, पूना हॉर्स आणि नेटिव्ह इन्फंट्रीच्या २६ व्या रेजिमेंटच्या काही कंपन्यां यांची गाठ पडली. त्रिंबकगडावरील उठाव हे त्र्यंबकमधील ब्राह्मणांचे नियोजन होते याची श्री चॅपमन याला माहिती होती. तेथील सर्व ब्राह्मणांना पकडून छावणीत रांगेत उभे करण्यात आले होते, परंतु  कट रचणाऱ्यांना प्रमुख व्यक्तीला  ओळखण्यासाठी कोणीही पुढे आले नाही.  कॅप्टन नट्टलने काही अंतरावर असलेल्या आपल्या छावणीतील कैद्यांना बोलावणे पाठवले. त्याने ठाकूरचा खबरी पांडूला बोलावले आणि त्याला कैद केलेल्या ब्राह्मणांच्या रांगांची तपासणी करण्यास आणि त्या लोकांमध्ये बंड करण्याचा सल्ला देणारा माणूस आहे का ? ते शोधण्यास सांगितले. पांडू रांगे समोरुन चालत गेला आणि चेहरा झाकलेल्या एका ब्राह्मणासमोर थांबला आणि त्याने कापड काढून टाकले आणि त्याचा चेहरा पाहून तो म्हणाला की तो त्या ब्राह्मणांपैकी एक आहे ज्याने ठाकूरांना त्र्यंबकवर हल्ला करण्यास प्रवृत्त केले होते. मग ज्या दुसऱ्या माणसाने कटाची कबुली दिली होती त्याला बोलावण्यात आले आणि रांगेतून चालत जाउन त्याने त्याच ब्राह्मणाला बाहेर काढले. दुसऱ्या दिवशी सकाळी या ब्राह्मणावर खटला चालवण्यात आला, त्याला दोषी ठरवण्यात आले, मृत्युदंड सुनावण्यात आला आणि त्र्यंबक येथे फाशी देण्यात आली. तोपर्यंत १२ तारखेच्या संध्याकाळी, पेठ परिसरातील लोकांनी उठाव केला आहे आणि त्यांनी हरसुल गाव लुटले गेले आहे अशी बातमी आली. कॅप्टन नट्टल लगेच निघाला आणि  १४ तारखेला हरसुलला पोहोचल्यावर त्यांला गावात तोडफोड, सरकारी कागदपत्रे फाडलेले, लिपिक आणि लेखापाल जखमी झालेले आणि गावातील सावकाराची हत्या झालेली आढळली. कॅप्टन नट्टल एक-दोन दिवस हरसुल येथे राहिला आणि त्यांने अनेक बंडखोरांना पकडले. मात्र या दरम्यान, बंडखोर डोंगर ओलांडून पेठकडे गेले आणि पोलिस त्यांच्याशी लढू शकले नाहीत, बंडखोरांनी पेठचा ३०० पौंड (३००० रुपये) खजिना लुटला आणि धरमपूर सीमेवरील एका टेकडीवर माघार घेउन आश्रय घेतला. लेफ्टनंट ग्लासपूलच्या नेतृत्वाखाली चौथ्या रायफल्सच्या तीस जणांची तुकडी दिंडोरीहून पेठला पोहोचल्यानंतर काही वेळातच त्यांनी बंडखोर दलातील काही मद्यधुंद लोकांना अटक केली. हे ऐकून बंडखोर त्यांच्या साथीदारांना वाचवण्यासाठी पेठला परतले. त्यांनी त्यांच्या लोकांची ब्रिटीशांच्या तावडीतून सुटका केली. बंडखोर लोक  हजारोच्या संख्येने असल्याने, तुलनेने कमी संख्येने असलेले ब्रिटिश सैन्याने तटबंदी असलेल्या सरकारी कार्यालयात आश्रय घेतला. बंडखोरांनी या कार्यालयाला वेढा घातला.  दुसऱ्या दिवशी, भागोजी नाईक आणि सुमारे साठ सैनिक सुरगाण्याहून आल्याने बंडखोरांची ताकद वाढली, त्यापैकी बरेच जण शस्त्रांनी सज्ज होते. दुसऱ्या दिवशी  ब्रिटीशांना सामील असणार्या एका मराठा जमीनदाराने कॅप्टन नट्टलला हरसुलजवळ ब्रिटीश सैन्याच्या गंभीर स्थितीची बातमी दिली. कॅप्टन नट्टल लगेचच पेठकडे निघाला. त्यांना पेठकडे जाताना वाटेत लागणार्या खिंडीत चार ठिकाणी अडथळे उभारलेले आढळले.मात्र अडथळे व्यवस्थित उभारले नव्हते आणि ब्रिटीश सैन्याने ते फार अडचणीशिवाय पार केले, घोडदळाने हल्ला केल्यानंतर खिंडीच्या शिखरावर असलेल्या शत्रूचा एक गट काही गोळ्या झाडून पळून गेला.
 संध्याकाळी पाच वाजता पेठला पोहोचल्यावर कॅप्टन नट्टल यांला लेफ्टनंट ग्लासपूल आणि रायफल्सचे तीस सैनिक सुरक्षित आढळले, परंतु त्यांचा दारूगोळा जवळजवळ संपला होता. ग्व्ल्या काही दिवसांपासून १५०० ते २०००  बंडखोरांनी सरकारी कार्यालयाच्या कमकुवत तटबंदीच्या भोवती वेढा घातला होता आणि त्या संध्याकाळी नवीन हल्ल्याची योजना आखण्यात आली होती. जरी कॅप्टन नट्टलने पेठमध्ये येउन मुकाबला करायला तयार झाला असला तरी बंडखोर पांगले नाहीत तर शहराजवळील डोंगरांच्या कपारीत ते लपून राहिले. म्हणून कॅप्टन नट्टलने आपले सैन्य बाहेर काढले आणि बंडखोरांवर हल्ला केला त्यात त्यांचा नेता, फाल्दी खान आणि अनेक कैदी मृत्युमुखी पडल्यानंतर त्यांना पराभूत केले. १९ तारखेला, सिव्हिल सर्व्हिसचा कॅप्टन वॉकर आणि बॉसवेल, १० व्या रेजिमेंटच्या तुकडीसह, सुरतहून आले. पेठ परिसर आता शांत झाला आणि या बंडाचा सुत्रधार पेठ परिसराचा प्रमुख, नानासाहेबांचा खबरी, भगवंतराव किंवा भाऊराव यांना त्यांच्या सुमारे पंधरा अनुयायांसह फाशी देण्यात आली. कॅप्टन वॉकरच्या आगमनाच्या दुसऱ्या दिवशी (२० डिसेंबर) अहमदनगर पोलिसांच्या पन्नास जणांसह, कॅप्टन नट्टल दक्षिणेकडे कूच करत गेला आणि न थांबता दुसऱ्या दिवशी दुपारी यासिर हिरा येथे सुमारे ५०० माणसे आणि पंधरा पूना हॉर्सच्या तुकडीसह बंडखोरांवर हल्ला केला आणि त्यांना हुसकावून लावले, त्यात तेरा जण ठार आणि काहीजण जखमी झाले आणि तीन कैद झाले. कॅप्टन नट्टल आणि भागोजीचा भाऊ महिपत नाईक यांच्यात झालेल्या हाताघाईच्या लढाईत भागोजीचा मृत्यू झाला आणि कॅप्टन नट्टलचा घोडा गंभीर जखमी झाला; आणि दुसऱ्या चकमकीत आणखी एक बंडखोर शेवटपर्यंत लढला, कॅप्टन नट्टलचा दुसरा घोडा जखमी झाला.मात्र या चकमकीचा उलट परिणाम होउन भागोजीच्या अनुयायांची संख्या वाढतच राहिली. १९ फेब्रुवारी १८५८ रोजी, ब्रिटीश सैन्याच्या मोठ्या तुकडीने, म्हणजे २१ पूना हॉर्स पलटणीचे घोडेस्वार , ४३० संगीनधारी कोळी शिपाई आणि ३० अहमदनगरचे कोळी शिपाई आणि मेजर पॉटिंगर आणि कॅप्टन नट्टल यांच्या नेतृत्वाखाली अहमदनगर पोलिसांनी येवला, चाळीसगाव आणि निजामच्या हद्दीवरील काकणकी किंवा पेडका किल्ल्याजवळील झुडुपात भागोजीच्या तुकडीवर हल्ला केला आणि त्यांना पांगवले. भिल्लांचे चाळीस लोक ठार आणि पाच लोक कैदी झाले. त्याचवेळी ब्रिटीश सैन्यातील चौथ्या रायफल्सचा एक ब्रिटिश सैनिक मारला गेला आणि तीन जखमी झाले. परंतु लवकरच बंडखोर पुन्हा एकत्र आले आणि १८५८ आणि १८५९ च्या बहुतेक काळात कॅप्टन नट्टल भागोजीच्या मागावर होता. ४ जानेवारी १८५९ रोजी कॅप्टन नट्टल यांना एक तातडीची बातमी मिळाली ज्यामध्ये त्याला अजिंठ्याकडे वेगाने कूच करण्याचे निर्देश देण्यात आला. तेथे दोन ते तीन हजार रोहिला जमल्याचे वृत्त आले होते. कॅप्टन नट्टल, ४६० पायदळ आणि एकवीस घोडेस्वारांच्या सैन्यासह, अजिंठ्याकडे निघाला आणि तीन दिवसांत त्यांच्या सर्व साहित्यासह सुमारे १०० मैल चालत गेला, या गडबडीत ब्रिटीश सैन्य अजिंठ्याला पोहोचण्यापूर्वीच, रोहिल्यांनी गाव लुटले आणि ते पांगले.त्यानंतरच्या  एप्रिल-मे १८५९ या कालावधीत भागोजी नाईक आणि हरजी नाईक यांच्या नेतृत्वाखालील भिल्लांनी त्यांचे क्रांतीकार्य सुरू ठेवले. ५ जुलै रोजी कॅप्टन नट्टलने संगमनेरच्या आग्नेयेस आठ मैल अंतरावर असलेल्या अंभोरा दाराजवळ भिल्लांवर हल्ला केला. भागोजी आणि हरजी यांच्या नेतृत्वाखालील भिल्लांनी तीव्र प्रतिकार केला, त्यांना पंचवीस कोळी सैनिकांनी माघार घ्यायला लावली.यात भागोजींचा मुलगा यशवंत, अनेक जखमी आणि तीन भिल्ल हुतात्मा झाले.  त्यांचा एक नेता हरजी नाईक हा होता. भिल्लांच्या तुकड्या भागोजींना सामील होण्यासाठी निजामाच्या प्रदेशात जमत असल्याचे वृत्त ऑक्टोबर १८५९ मध्ये, आले. ब्रिटीशांच्या ताब्यात असलेल्या प्रदेशामध्येही पुन्हा भिल्ल सैन्य जमा होत होते. या परिस्थितीत  ब्रिटीश ताब्यातील प्रदेश आणि निजामाच्या अखत्यारीतील प्रदेशाच्या नेटिव्ह इन्फंट्रीची एक तुकडी  सीमेवर तैनात ठेवण्यात आली होती. त्याच्या बरोबर पुणे घोडदळाच्या तुकड्यांची सतत गस्त सुरु होती. २६ ऑक्टोबर रोजी भागोजींनी कोपरगावमधील कोर्हळा गाव लुटले आणि सुमारे १८०० पौंड (१८,००० रुपये) किमतीची मालमत्ता पळवून नेली. कॅप्टन नट्टल यांने सह्याद्रीच्या खडतर प्रदेशात, कोकणात आणि पुन्हा अहमदनगरपर्यंत  जवळजवळ पंधरा दिवस त्याचा जोरदार पाठलाग केला, परंतु भागोजी अतिशय जलद आणि गुप्त हालचाली करून तो नेहमीच त्याच्या पाठलाग करणाऱ्यांना तुरी देउन गायब होण्यात यशस्वी झाले. दरम्यान, जुलैमध्ये सर फ्रँक याची पोलिस अधीक्षक म्हणून नियुक्ती झाल्यापासून त्याने भागोजींचा माग काढायला सुरु केला. ११ नोव्हेंबर रोजी, घोडेस्वार पोलिसांच्या तुकडी घेउन तो सिन्नरमधील मिठसागरे गावात पोहोचला. त्याला शेजारच्या पांचाळा गावाच्या पाटलाने बातमी दिली की भागोजी नाईक आणि त्यांचे अनुयायी गावात आहेत. इंग्रजांनी रात्रीतून पंचाळेला वेढा दिला.खंडेराव काळे यांच्च्या घरात लपलेल्या भागोजीना कल्पनाच नव्हती की आपल्याला इंग्रज सेनेने संपूर्णपणे वेधले आहे. ते घरातून बाहेर पडले आणि इंग्रज सैनिकांनी थेट गोळीबार सुरु केला. इंग्रजांना प्रतिउत्तर देत स्वतःचा जीव वाचवत भागोजी नाईक व त्यांचे साथीदार सांगवीच्या दिशेने निघाले. त्या ठिकाणी पोहोचल्यावर, सुटर यांने नदीच्या उत्तरेकडून ज्याबाजुला उंच भाग आणि झुडुपे होती तिकडून हल्ला करण्याचा आणि भिल्ला सैन्याला दक्षिण बाजुला पळवून लावण्याचा निर्णय घेतला. भागोजी नाईक आणि त्यांच्या साथीदारांना सुगावा लागू न देता ब्रिटीश फौजेला त्यांच्या जवळ आणण्यात यश आले. ज्याक्षणी भागोजी आणि त्यांचे साथीदार ब्रिटीश फौजेच्या दृष्टीस पडले लगेच सुटरने घोडेस्वार पोलिसांना हल्ल्याचा इशारा केला आणि त्यांच्या उर्वरित सैन्याला दुसर्या बाजुने चढाई करण्याचे आदेश दिला. अचानक झालेल्या या हल्ल्यामुळे भागोजी आणि त्यांचे साथीदार यांना सुरवातीला सावरायला वेळ लागला. मात्र लवकरच ते सावध झाले आणि नदीपात्राच्या झाडीझुडपात लपून त्यांनी प्रतिहल्ला केला. सांगवी इथल्या देवनदी व गोदावरीच्या संगमावर घनघोर युद्ध झाले.भिल्लांचे खूप मोठे नुकसान झाले. या चकमकीत फक्त पंधरा जण जिवंत राहिले, तेव्हा ते नदीच्या पात्रातून हळू हळू माघार घेउ लागले, तरीही जोरदार गोळीबार चालू होता. वारंवार शस्त्रे ठेवण्याचे आवाहन करूनही त्यांनी नकार दिला आणि एकामागून एक माणूस मृत्युमुखी पडला. शेवटी जे काही उरले होते त्यांना नदीच्या पात्रातून उघड्यावर जबरदस्तीने बाहेर काढण्यात आले आणि घोडेस्वार पोलिसांनी त्यांच्यावर हल्ला केला. भिल्ल सैन्य अत्यंत धैर्याने शेवटपर्यंत लढले. एकोणचाळीस जणांपैकी त्यांचा नेता भागोजीसह पंचेचाळीस जण ठार झाले आणि तीन जण गंभीर जखमी झाले. कारवाईदरम्यान सुटरचा घोडा दोन गोळ्यांनी मेला आणि पोलिसांपैकी चार जण ठार झाले आणि सोळा जण जखमी झाले. या युद्धात इंग्रजांच्या गोळीने भागोजींचा ठाव घेतला. त्यांना वीरमरण आले. भागोजींच्या सहकाऱ्यांनी त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार केले व त्यांची समाधी उभारली. भागोजी नाईकांची समाधी उभारली म्हणून इंग्रजांनी सांगवीकरांचा प्रचंड छळ केला. त्यांनी आपल्या क्रांतीविरासाठी हि लढाई लढली म्हणूनच सांगवीला लढाईची सांगवी म्हटले जाऊ लागले. पुराच्या तडाख्यात या समाधीचेही प्रचंड नुकसानझाले होते पण सांगवीमधील तरुणांनी त्यांचा डागडुजी करून आणली. इतिहास भागोजी नाईकांच्या शौर्याला विसरला मात्र सांगवीच्या ग्रामस्थांनी हा ठेवा जपला. आजही गोदावरीच्या संगमावर हि समाधी उभी आहे.
 
१२ नोव्हेंबर रोजी, भागोजीच्या नातेवाईक असलेल्या एका सरदाराच्या नेतृत्वाखाली भिल्लांचा एक मोठा गट भागोजीला सामील होण्यासाठी नेवासा येथील सोनई येथून निघाला. त्यांच्या मृत्यूची बातमी कळताच ते खानदेशकडे वळले आणि त्यांनी कोणताही गुन्हा केला नसल्यामुळे त्यांना माफी देण्यात आली आणि त्यांच्या घरी परतण्याची परवानगी देण्यात आली. भागोजीच्या मृत्यूनंतर, त्यांच्या नातेवाईक म्हार्दिया आणि त्यांच्या टोळीतील एक सदस्य, जो ११ नोव्हेंबर रोजीच्या लढाईत सामील नव्हता, त्यांनी सुमारे दहा-बारा अनुयायांची फौज उभी केली आणि व्यापारी मार्गावर दरोडे घातले. शेवटी त्याने सुटरचा खबरी म्हणून काम करणाऱ्या एका माणसाची हत्या केली आणि त्याची बाजु  घेण्याचा प्रयत्न करणाऱ्या त्याच्या पत्नी आणि मुलाचे तुकडे केले. त्यानंतर लवकरच म्हार्दियाला पकडण्यात आले आणि त्याच्या टोळीतील पाच जणांसह फाशी देण्यात आली. पुढे हा अशांततेचा काळ संपला तरी मे १८६० पर्यंत नियमित सैन्याच्या चौक्या कायम ठेवण्यात आल्या. जेव्हा त्यांना हटवण्यात आले, तेव्हा त्यांची जागा कोळी लोकांच्या तुकड्यांनी घेतली. मार्च १८६१ पर्यंत कोळी सैनिक या परिसरात कर्तव्य बजावत राहिले, मात्र जशी गरज संपली जेव्हा त्यांना बरखास्त करण्यात आले आणि पोलिसात दाखल झालेल्या काही जणांना वगळता सर्वजण त्यांच्या पूर्वीच्या शेती आणि शेतमजुरीच्या कामात परतले.

क्रांतिकारक अनंत कान्हेरे

अनंत लक्ष्मण कान्हेरे हे भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील एक सशस्त्र क्रांतिकारक होते. अनंतरावांचा जन्म १८९१ मध्ये रत्नागिरी जिल्ह्यातील आयनी-मेटे या गावी झाला. प्राथमिक शिक्षण इंदूर येथे झाल्यानंतर पुढे इंग्रजी शिक्षणासाठी १९०३ मध्ये अनंत कान्हेरे संभाजीगरात आले. आपले मामा गोविंद बर्वे यांच्याकडे ते रहात असत. मध्यंतरी एक वर्ष बार्शी येथे राहिल्यानंतर ते पुन्हा संभाजीगरात आले. संभाजीनगरात ते गंगाराम रुपचंद श्रॉफ यांच्या घरात भाड्याने राहत असत.गंगाराम यांचा येवल्यात टोणपे नावाचा एक मित्र होता.
 

अनंत कान्हेरे 

 Anant Kanhere

 छत्रपती संभाजीनगर येथे सिटी चौकात असलेला हुतात्मा अनंत कान्हेरे यांचा पुतळा

२० व्या शतकाच्या सुरुवातीला ब्रिटिशांनी निष्पाप भारतीयांवर केलेल्या अत्याचारांमध्ये वाढ झाली. लोकमान्य टिळकांना ६ वर्षांसाठी तुरुंगात टाकण्यात आले. बाबाराव उर्फ ​​गणेश दामोदर सावरकर यांना त्यांचे धाकटे बंधू विनायक सावरकर यांची देशभक्तीपर गीते प्रकाशित केल्याबद्दल जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली. नाशिकचे तत्कालीन जिल्हाधिकारी जॅक्सन हे बाबाराव सावरकर यांच्यावर खटला चालवण्याची जबाबदारी सांभाळत होते. त्यांनी प्रसिद्ध वकील वामन सखाराम खरे यांना इतका छळ केला की खरे यांनी त्यांचे मानसिक संतुलन गमावले. खरे यांचा एकमेव 'गुन्हा' होता की त्यांनी क्रांतिकारकांची बाजू मांडली.

जॅक्सन 

 (चित्रात जॅक्सनचा खून झालेल्या थिएटरचे प्रवेशद्वार दाखवले आहे.)

विजयानंद थिएटरमध्ये जॅक्सनचा निरोप समारंभ आयोजित करण्यात आला होता. (चित्रात जॅक्सनचा खून झालेल्या थिएटरचे प्रवेशद्वार दाखवले आहे.) या प्रसंगाचे औचित्य साधून शारदा हे प्रसिद्ध मराठी नाटक सादर करण्यात आले. अनंत कान्हेरे आणि त्यांचे मित्र त्यांची योजना अंमलात आणण्यासाठी सज्ज झाले होते. अनंतने संधी साधून जॅक्सनवर गोळीबार केला. योजनेनुसार, अनंतने आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला पण तो अयशस्वी झाला. त्याने इंग्लंडहून वीर सावरकरांनी पाठवलेल्या २० रिव्हॉल्व्हरपैकी एकाचा वापर केला. तो ऐतिहासिक दिवस होता: २१ डिसेंबर १९०९.
      त्या काळात अनेक गुप्त क्रांतिकारी संस्था कार्यरत होत्या. नाशिकमधील एका गुप्त संस्थेचा टोणपे हे सदस्य होते. गणू वैद्य आणि गंगाराम एकदा नाशिकमधील गुप्त क्रांतिकारी संस्थेसाठी शस्त्रे खरेदी करण्यासाठी गेले होते. या वैद्यांशी कान्हेरे यांची ओळख झाली. कान्हेरे क्रांतिकारी गटांच्या कार्याकडे आकर्षित झाले. नाशिकच्या स्वातंत्र्यवादी गुप्त संस्थेच्या काशीनाथ टोणपे यांनी गंगाराम आणि अनंतराव यांना गुप्त संस्थेची शपथ दिली. मदनलाल धिंग्रांनी कर्झन वायलीच्या घेतलेल्या प्रतिशोधानंतर अनंतरावही अशा कृतीला अधीर झाले. मग गंगाराम यांनी एकदा अनंतरावांच्या हातावर तापलेला लोखंडी चिमटा ठेवून आणि एकदा पेटलेल्या चिमणीची तापलेली काच दोन्ही हातांनी धरायला सांगून त्यांची परीक्षा घेतली. दोन्हीही दिव्ये करूनही अनंतरावांची मुद्रा निर्विकार होती ! 
           २० व्या शतकाच्या सुरुवातीला ब्रिटिशांनी निष्पाप भारतीयांवर केलेल्या अत्याचारांमध्ये वाढ झाली. लोकमान्य टिळकांना ६ वर्षांसाठी तुरुंगात टाकण्यात आले. बाबाराव उर्फ ​​गणेश दामोदर सावरकर यांना त्यांचे धाकटे बंधू विनायक सावरकर यांची देशभक्तीपर गीते प्रकाशित केल्याबद्दल जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली. सावरकर बंधूनी नाशिक येथे अभिनव भारत संस्थेची स्थापना केली होती. या संस्थेशी कान्हेरे यांचा संबंध आला. या गटातील युवक संभाजीनगरात नियमित भेटत. तेव्हा नाशिक इलाख्यात जॅक्सनचे जुलमी अत्याचार सुरु होते. जॅक्सनने मराठी भाषेचा अभ्यास केला. तो सामान्य लोकांशी मराठीतच बोलत असे. नाशिकचे तत्कालीन जिल्हाधिकारी जॅक्सन हा बाबाराव सावरकर यांच्यावर खटला चालवण्याची जबाबदारी सांभाळत होता.  बाबाराव सावरकर व अन्य क्रांतिकारकांच्या विरोधात त्याने राजद्रोहाचा खटला भरून काळ्या पाण्याची शिक्षा दिली. त्याचा राग तरुणांमध्ये धुमसत होता. त्यातच एका टांगेवाल्याला चाबकाचे फटके देऊन मारणा-या विल्यम या आधिका-यास जॅक्सनने सोडून दिले. त्यांने प्रसिद्ध वकील वामन सखाराम खरे यांना इतका छळ केला की खरे यांनी त्यांचे मानसिक संतुलन गमावले. क्रांतिकारी संघटनेत सहभाग घेत आसल्याच्या आरोपावरून बाबासाहेब खरे यांची वकिलीची सनद त्याने रद्द केली. खरे यांचा एकमेव 'गुन्हा' होता की त्यांनी क्रांतिकारकांची बाजू मांडली.  तांबे शास्त्रींना कारागृहात पाठविले. त्यामुळे संभाजीनगरात जॅक्सन वधाची योजना आखली गेली. या सर्व घटनांमुळे नाशिकमधील देशभक्त तरुणांमध्ये तीव्र प्रतिक्रिया उमटल्या. शेवटचा धक्का तेव्हा लागला जेव्हा एका ब्रिटिश अधिकाऱ्याने एका शेतकऱ्याला त्याच्या गाडीला ओव्हरटेक करू न दिल्याबद्दल मारहाण करून ठार मारले. परिस्थिती उत्कंठावर्धक टप्प्यापर्यंत तापत असताना, जॅक्सनची नाशिकबाहेर पदोन्नतीवर बदली झाली. कान्हेरे आणि त्याच्या मित्रांनी ठरवले: आता नाही तर कधीच नाही!
      अशा अनेक कुकर्मांनीच जॅक्सनने आपला मृत्यूलेख लिहिला. जॅक्सनची मुंबईला प्रमोशनवर बदली झाल्यानंतर त्याला नाशिक येथे २१ डिसेंबर १९०९ निरोपाचा कार्यक्रम ठरला. त्यासाठी नाशिकच्या विजयानंद नाट्यगृहात  जॅक्सनचा निरोप समारंभ आयोजित करण्यात आला होता.  या प्रसंगाचे औचित्य साधून 'शारदा' हे प्रसिद्ध मराठी नाटक सादर करण्यात आले. अनंत कान्हेरे आणि त्यांचे मित्र त्यांची योजना अंमलात आणण्यासाठी सज्ज झाले होते. जॅक्सनच्या वधासाठी विनायक देशपांडे, अण्णा कर्वे, अनंत कान्हेरे यांची निवड झाली होती. या कामी नियतीनेच अनंतरावांची निवड केली. क्रांतिकारकांसाठी स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी पाठविलेले पिस्तूल हत्येसाठी वापरण्यात आले. नेम अचूक रहावा म्हणून कान्हेरे यांनी संभाजीनगरात नेमबाजीचा सराव केला.आदल्या दिवशी नाशिकला पोहचल्यानंतर कलेक्टर ऑफिसमध्ये जाऊन जॅक्सनचा चेहराही पाहून घेतला होता.  ‘जॅक्सनला मारल्यावर फाशी जावे लागेल, तेव्हा निदान आई-वडिलांकडे आठवणीसाठी आपले एखादे छायाचित्र असावे’; म्हणून त्यांनी स्वतःचे एक छायाचित्रही काढून घेतले.
      जॅक्सन आल्यानंतर नाटकाची नांदी सुरु झाली.जॅक्सन दरवाजातून नाट्यगृहात प्रवेश करत असताना आधीच येऊन बसलेल्या अनंतरावांनी जॅक्सनवर गोळी झाडली. ती त्याच्या काखेतून निघून गेली. चपळाई करून अनंतरावांनी जॅक्सनवर समोरून चार गोळ्या झाडल्या. जॅक्सन जागीच कोसळला. त्यानंतर दुसरी पिस्तूल काढून स्वतः वर गोळी झाडण्याचा प्रयत्न केला. पण तो अपयशी ठरला. त्यानंतर कान्हेरे आपल्या जागेवरच शांतपणे उभे राहिले, त्यांना अटक करण्यात आली. तो ऐतिहासिक दिवस होता: २१ डिसेंबर १९०९.

कर्वे - देशपांडे

या हत्येची संपूर्ण जबाबदारी फक्त अनंतने घ्यावी अशी योजना होती जेणेकरून इतर कटकारस्थाने अंधारात राहतील. पण तसे झाले नाही. पोलिसांनी कृष्णाजी गोपाळ कर्वे, विनायक नारायण देशपांडे, शंकरराव सोमण, वामनराव जोशी आणि गणू वैद्य यांना अटक केली. या सर्व तरुणांना सरकारवाड्यात ताब्यात घेण्यात आले आणि कटाबद्दल अधिक जाणून घेण्यासाठी त्यांच्यावर क्रूर वागणूक देण्यात आली. छळ करणाऱ्या पोलिस पथकाचे नेतृत्व अलीखान करत होते, जो त्याच्या अमानवी वर्तनासाठी प्रसिद्ध होता. या धाडसी तरुणांवरील खटला भारताच्या इतिहासात 'नाशिक कट खटला' म्हणून प्रसिद्ध आहे.

जॅक्सन खून खटला

२१ डिसेंबर १९०९ च्या रात्री नाशिकचे जिल्हाधिकारी श्री. जॅक्सन यांच्या हत्येप्रकरणी खालील व्यक्तींना अटक करण्यात आली होती:

नाव रोजी अटक केली यावर निवेदन दिले
अनंत लक्ष्मण कान्हेरे २१ डिसेंबर १९०९ २१ डिसेंबर १९०९
कृष्ण गोपाळ कर्वे २४ डिसेंबर १९०९ ६ जानेवारी १९१०
विनायक नारायण देशपांडे २३ डिसेंबर १९०९ ६ जानेवारी १९१०
शंकर रामचंद्र सोमण २३ डिसेंबर १९०९ ६ जानेवारी १९१०
वामन दाजी नारायण जोशी ३० डिसेंबर १९०९ ४ जानेवारी १९१०
गणेश बी. वैद्य २२ डिसेंबर १९०९ २ जानेवारी १९१०
दत्तात्रय पांडुरंग जोशी २२ डिसेंबर १९०९ ५ जानेवारी १९१०

ते कोण होते?

अनंत लक्ष्मण कान्हेरे

१८९१ मध्ये जन्म. मोठा भाऊ गणपतराव, धाकटा भाऊ शंकरराव. दोन बहिणी. इंदूर येथे आयुष्य सुरू केले. १९०३ मध्ये पुढील शिक्षणासाठी औरंगाबादला त्यांचे काका बर्वे यांच्याकडे गेले. त्यांचे भाऊ गणपतराव बार्सी येथे. अनंत काही काळ या भावासोबत राहिले. १९०८ मध्ये ते औरंगाबादला परतले आणि गंगाराम रूपचंद श्रॉफ यांच्या घरी भाड्याने घेतलेल्या खोलीत राहिले. गंगारामचा येवले येथे टोणपे नावाचा एक मित्र होता. तो नाशिकच्या गुप्तहेराचा सदस्य होता. नाशिकचा एक गणू वैद्य त्याच्या नातेवाईकाला भेटण्यासाठी येवले येथे येत असे. गणूची येवले येथे गंगारामशी ओळख झाली. तो नाशिक गुप्तहेर सोसायटीसाठी स्वस्त शस्त्रे खरेदी करण्यासाठी गंगारामसोबत औरंगाबादला गेला. अनंतची औरंगाबाद येथे या वैद्याशी ओळख झाली.

कृष्णाजी गोपाळ कर्वे

१८९१ मध्ये जन्म. मोठा भाऊ गणपतराव, धाकटा भाऊ शंकरराव. दोन बहिणी. इंदूर येथे आयुष्य सुरू केले. १९०३ मध्ये पुढील शिक्षणासाठी औरंगाबादला त्यांचे काका बर्वे यांच्याकडे गेले. त्यांचे भाऊ गणपतराव बार्सी येथे. अनंत काही काळ या भावासोबत राहिले. १९०८ मध्ये ते औरंगाबादला परतले आणि गंगाराम रूपचंद श्रॉफ यांच्या घरी भाड्याने घेतलेल्या खोलीत राहिले. गंगारामचा येवले येथे टोणपे नावाचा एक मित्र होता. तो नाशिकच्या गुप्तहेराचा सदस्य होता. नाशिकचा एक गणू वैद्य त्याच्या नातेवाईकाला भेटण्यासाठी येवले येथे येत असे. गणूची येवले येथे गंगारामशी ओळख झाली. तो नाशिक गुप्तहेर सोसायटीसाठी स्वस्त शस्त्रे खरेदी करण्यासाठी गंगारामसोबत औरंगाबादला गेला. अनंतची औरंगाबाद येथे या वैद्याशी ओळख झाली.

विनायक नारायण देशपांडे

तो १८ वर्षांचा विद्यार्थी होता.

शंकर रामचंद्र सोमण

वामन दाजी नारायण जोशी

तो २० वर्षांचा होता. तो पंचवटी शाळेत शिक्षक होता.

तोच गुप्त संस्थेसाठी स्फोटके आणि शस्त्रे गोळा करणारा आणि साठवणारा व्यक्ती होता. अनंतने सावरकरांच्या क्रूर शिक्षेविरुद्ध बदला घेण्यासाठी काहीतरी करण्याची तयारी त्यांच्याकडेच व्यक्त केली.

दत्तात्रय पांडुरंग जोशी

तो औरंगाबाद येथे विद्यार्थी होता आणि अनंतचा मित्र होता. न्यायालयात अनंत कान्हेरे यांनी कोणत्याही वकिलाशिवाय स्वतःचा बचाव केला. खटल्यादरम्यान तो शांत आणि शांत होता. तो शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या इतका स्थिर होता की, अधिकृत नोंदींनुसार, या काळात त्याचे वजन १५ पौंड वाढले!

७ मार्च १९१० रोजी सर्व आरोपींना न्यायालयात हजर करण्यात आले. त्यात अनंत कान्हेरे, कृष्णाजी कर्वे, विनायक देशपांडे, शंकरराव सोमण, वामनराव जोशी, गणू वैद्य आणि दत्तू जोशी यांचा समावेश होता. या धाडसी तरुणांचे 'दर्शन' घेण्यासाठी न्यायालयाबाहेर शेकडो नागरिक जमले होते. न्यायमूर्ती श्री. हिटन अनंतच्या व्यक्तिमत्त्वाने इतके प्रभावित झाले की त्यांनी टिप्पणी केली.
      "मला खूप वाईट वाटते की मला त्याला मृत्युदंड द्यावा लागला." २० मार्च १९१० रोजी न्यायालयाने निकाल जाहीर केला. कान्हेरे, कर्वे आणि देशपांडे यांना फाशी देण्यात येणार होती. शंकरराव सोमण, वामनराव जोशी आणि गणू वैद्य यांना जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली. तथापि, नंतर गणू वैद्य यांना योग्य वागणूक देण्यात आली. सोमण आणि वामनराव जाशी यांना अंदमान - काळापाणी येथे नेण्यात येणार होते. परंतु सोमण (सुदैवाने?) यांना अंदमानला पाठवण्यापूर्वीच त्यांचे निधन झाले. वामनराव जोशी यांना अंदमानातील सेल्युलर तुरुंगाची यातना सहन करावी लागली. १९ एप्रिल १९१० रोजी कान्हेरे, कर्वे आणि देशपांडे यांना ठाण्याच्या तुरुंगात  फाशी देण्यात आली. कृष्णाजी कर्वे हे त्यांच्या पालकांचे एकुलते एक पुत्र होते. त्यांच्या सर्वोच्च बलिदानामुळे त्यांच्या वंशाचा अंत झाला.
      अंदमानच्या सेल्युलर जेलमध्ये आपल्याला ३०० कैद्यांची यादी आढळते ज्यांना तुरुंगात ठेवण्यात आले होते. यादीत तीन महाराष्ट्रीय लोकांचा समावेश आहे: स्वतंत्रवीर सावरकर, बाबाराव सावरकर आणि वामनराव जोशी.
नाशिककरांसाठी अभिमानाची गोष्ट आहे की हे सर्वजण नाशिकचे होते!

स्वा. सावरकर आणि नाशिकचे ऋणानुबंध...

Swatantryaveer Savarkar and nashik relation

   स्वातंत्र्यवीर सावरकर आणि नाशिकनगरी यांचे एक दृढ नाते आहे.  स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे क्रांतिकार्य हे नाशिकमध्येच खर्‍या अर्थाने सुरू झाले, असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही.

          दि. २२ जून, १८९७ मध्ये चापेकर बंधूंनी रँड आणि आयर्स्ट या ब्रिटिश अधिकार्‍यांचा गोळ्या घालून वध केला होता. पिसाळलेल्या ब्रिटिश सरकारने ‘प्लेग’च्या नावाखाली केलेली दडपशाही व हुकूमशाही अजूनच मोठ्या प्रमाणात सुरू केली. ‘सरकारचे डोके ठिकाणावर आहे का?’ असा प्रश्न करणार्‍या आणि चापेकर यांना क्रांतिकार्यासाठी प्रवृत्त करणार्‍या लोकमान्य टिळकांनाही कारावासात धाडण्यात आले. दररोज वृत्तपत्रांतून येणारा या सार्‍या घटनांचा व खटल्यांचा तसेच दामोदर आणि बाळकृष्ण चापेकर यांना फाशी दिल्याचा सविस्तर वृत्तांत विनायक नियमित वाचत होता आणि अस्वस्थ होत होता. आपण सुद्धा त्यांचे हे कार्य पुढे का चालवू नये, असे विचार त्याच्या मनात येऊ लागले होते आणि याच भावनेतून वीर विनायकाने आपली कुलदेवता अष्टभुजा देवीसमोर नतमस्तक होऊन शपथ घेतली. ती अशी की, “माझ्या देशाच्या स्वातंत्र्यासाठी मी सशस्त्र युद्धात शत्रूस मारीत चापेकारांसारखा मरेन किंवा छत्रपती शिवाजी महाराजांसारखा विजयी होऊन मातृभूमीच्या मस्तकी स्वराज्याचा राज्याभिषेक करवेन.“

१८९८ मध्ये बाबाराव, तात्याराव सावरकर हे दोघे सावरकर बंधू नाशिकच्या तीळभांडेश्वर गल्ली येथील वर्तकांच्या वाड्यात वास्तव्यास आले. भगूर व तेथील इतर सर्व आजूबाजूच्या गावांमध्ये ‘प्लेग’ची महामारी सुरू झाली होती. नाशिकमध्ये तीळभांडेश्वर गल्लीमध्येच रामभाऊ दातार व वामन दातार या दातार बंधूंशी सावरकर बंधूंचा स्नेह निर्माण झाला होता. तेव्हा याच दातार बंधूंनी सावरकर कुटुंबीयांना नाशिकमध्येच वास्तव्यास येण्यास सांगितले. सुरुवातीला वर्तकांच्या वाड्यात राहणारे सावरकर कुटुंबीय नंतर तो वाडा सोडून दातारांच्या घरात वास्तव्य करू लागले. ही सर्व मंडळी राष्ट्रभक्ती व राष्ट्रप्रेम या राष्ट्रीय भावनेने भारावलेली होती. ‘आपला भारत देश या जुलमी व अत्याचारी ब्रिटिश राजवटीत अडकला आहे. भारतीय जनता भरडली जात आहे. आपण आपल्या परीने जमेल तशी सशस्त्र क्रांती करून इंग्रजांच्या विरोधात लढले पाहिजे,‘ असे या सर्वांचे ठाम मत होते. यातूनच नोव्हेंबर १८९९ मध्ये या सर्व मित्रांनी म्हणजेच सावरकर बंधू, दातार बंधू, वर्तक, चिपळूणकर, म्हसकर, पागे या सर्वांनी मिळून ‘राष्ट्रभक्त समूह‘ ही गुप्त संघटना स्थापन केली. याची प्रकट शाखा म्हणून दि. १ जानेवारी १९०० ला ‘मित्रमेळा’ या संस्थेची स्थापना केली. ‘मित्रमेळा’च्या बैठकांमध्ये तत्कालीन इंग्रज करत असलेले जुलूम-जबरदस्ती व अन्याय कृतींबाबत चर्चा केली जात असे. तसेच, त्या काळात नाशिकमध्येसुद्धा ‘प्लेग’ महामारी उद्भवली होती. तेव्हा याच ‘मित्रमेळ्या‘च्या सदस्यांनी मृत्युमुखी पडलेल्या त्या प्रेतांची अग्निसंस्काराची कार्ये केली.
         आजारी माणसांचा विरह, नातलगांचा आक्रोश हे सर्व बघत असतानाच, या नातलगांना धीर देणे व त्यांची घरातील कामे करण्यासाठी व थोडीफार आर्थिक मदत करण्यासाठी ‘मित्रमेळ्या‘चे सदस्य नेहमीच पुढे असत. ‘स्वातंत्र्य हेच साध्य आणि सशस्त्र क्रांती हेच साधन’ हे ‘मित्रमेळ्या’चे ब्रीदवाक्य होते. ‘मित्रमेळ्या‘त जातीभेद नव्हता, शिवजयंती व गणेशोत्सव हे दोन्ही सण मोठ्या उत्साहाने ‘मित्रमेळा‘ समूहातर्फे नाशिकमध्ये साजरे केले जात. विनायक सावरकर हा तरुण मुलगा तेथीलच जवळील पिंपळाच्या पारावर उभा राहून देशाची सध्याची परिस्थिती आपल्या भाषणातून सांगत असे. ‘देश स्वतंत्र व्हावा, यासाठी सर्वांनी आपापसातील वैयक्तिक हेवेदावे विसरून राष्ट्रभक्ती हेच ध्येय डोळ्यासमोर ठेवून इंग्रजांविरोधात लढले पाहिजे,‘ असे हा तरुण विनायक सर्व नाशिककरांना सांगत असे. विनायकाची भाषणे ऐकण्यासाठी दुरून लोक नाशिकला येत असत. पिंपळपार परिसरामध्ये जमत असत. ‘स्वातंत्र्यलक्ष्मी की जय, छत्रपती शिवाजी महाराज की जय, टिळक महाराज की जय’ अशा घोषणांनी हा संपूर्ण परिसर दुमदूमून जात असे. आबा दरेकर अर्थात कवी गोविंद हेसुद्धा पुढील काही काळातच ‘मित्रमेळ्या‘त येऊ लागले. सुरुवातीला लावणी, वग सवाल-जवाब इत्यादींचे लिखाण करून त्यावर आपला व आपल्या आईचा उदरनिर्वाह करणारा व पायाने अधू असणारा हा तरुण म्हणजेच आबा दरेकर सुरुवातीला सावरकरांची व त्यांच्या ‘मित्रमेळ्या‘ची टिंगलटवाळी करत असे. “अशी संस्था स्थापन करून किंवा एखादा समूह स्थापन करून, शपथा वगैरे घेऊन देश कधी स्वतंत्र होईल का??” असे तो थट्टेने बोलत असे. मात्र, एकदा सावरकरांनी “तू आमच्या बैठकांना येत जा आणि आम्ही तिथे काय चर्चा करतो ती ऐकत जा,“ असे त्यांना सांगितले.
     कवी गोविंद एकदा तात्यारावांच्याच पाठीवर बसून ‘मित्रमेळ्या‘च्या कार्यालयात आला व पुढील काळात तो या सर्व बैठकीस उपस्थित राहू लागला. हळूहळू राष्ट्रप्रेम, स्वातंत्र्य, भारतमाता त्याचप्रमाणे १८५७चा उठाव देशात व परदेशात झालेली स्वातंत्र्ययुद्धे हे सर्व विषय तो आवडीने समजून घेऊ लागला, अभ्यासू लागला. परिसाचा स्पर्श लोखंडाला होतो, तेव्हा त्या लोखंडाचे सोने होते, असे नेहमी म्हटले जाते. अगदी असेच तात्याराव सावरकरांच्या सान्निध्यात आलेला हा आबा दरेकर आता राष्ट्रभक्तीने, राष्ट्रप्रेमाने भारून गेला होता. नाशिकमधील गंजमाळ परिसरात लावण्यांचे फड लागत. तेथे जाऊन लावण्या लिहिणारा हा आबा दरेकर आता सावरकरांनी सांगितल्याप्रमाणे राष्ट्रभक्तीच्या पुस्तकांचे वाचन करू लागला होता. “आबा, तुझ्या अंगी प्रतिभाशक्ती आहे. तुझी शक्ती तू राष्ट्रकार्यासाठी वापरलीस व तुझ्या लेखणीतून भारतमाता त्याचप्रमाणे भारतमातेचे आत्ताचे रूप समस्त देशाला समजेल, असे काव्य जर तुझ्या लेखणीतून लिहिले गेले, तर समस्त भारतीय पुढील काळात तुझे उपकार कधी विसरू शकणार नाहीत,“ असे तात्याराव एकदा त्यांना म्हणाले असता, खरोखरच आबा दरेकर तेव्हापासून राष्ट्रीय कविता व राष्ट्रीय लेख लिहू लागले. आबा दरेकर अर्थात स्वातंत्र्यकवी गोविंद यांनी रचलेली राष्ट्रविषयक पदे, वीर सावरकरांचे पोवाडे ठिकठिकाणी गायले जात असत.
        व्याख्यानातून, मिरवणुकीतून स्वातंत्र्याच्या, स्वदेशाच्या, स्फूर्तीदायक संदेशावाचून इतर कुठलेही बोलणे-वागणे या तरुणाला आता अजिबात माहीत नव्हते. ‘मित्रमेळा‘च्या सदस्यांची संख्या व शाखांची संख्या दिवसेंदिवस वाढू लागली होती. याचवेळी वयाच्या १८व्या वर्षी एप्रिल महिन्यात १९०१ मध्ये तात्यारावांचं लग्न जव्हारच्या रामचंद्र त्र्यंबक अर्थात भाऊराव चिपळूणकरांची मुलगी यमुनाशी झालं. भाऊरावांनी आपल्या जावयाच्या महाविद्यालयीन शिक्षणाची जबाबदारी स्वीकारली. लग्नानंतर मॅट्रिकच्या परीक्षेसाठी वीर सावरकर पुण्यात दाखल झाले. मॅट्रिकची परीक्षा देऊन १९०२ मध्ये त्यांनी पुण्याच्या फर्ग्युसन महाविद्यालयात प्रवेश घेतला आणि तेथेही समविचारी तरुणांना संघटित केले. १९०४ मध्ये सावरकरांनी नाशिकमध्ये देशस्वातंत्र्याची शपथ घेतलेल्या ‘मित्रमेळ्या‘च्या २०० सदस्यांचा मेळावा भरवला. या मेळाव्यातच गुप्त क्रांतिकारक संघटनेचे नामकरण ‘अभिनव भारत’ असे करण्यात आल. इटलीचा जोसेफ मॅझिनी यांच्या ‘यंग इटली’ या संस्थेच्या धर्तीवर हे नाव दिले गेले होेते. हातात पुरेसे चाकू नसलेली १००-२०० मूलं तरुण सावरकर यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रभक्ती व स्वातंत्र्यप्राप्ती या हेतूने व उद्देशानेच एकत्र आली होती. हळूहळू ‘अभिनव भारत‘च्या शाखांचे जाळे भारतभरच नव्हे, तर देशभर पसरले.
    १९०४ मध्ये वीर सावरकर ‘एलएलबी’च्या पहिल्या परीक्षेत उत्तीर्ण झाले. ऑक्टोबर १९०५ मध्ये त्यांनी पुण्यात परदेशी कपड्यांची होळी केली आणि अवघ्या महाराष्ट्रानेच नव्हे, तर अवघ्या देशाने या कृतीचे कौतुक व समर्थन केले. यानंतर वीर सावरकर यांनी ओळखले होते की, भारताला स्वातंत्र्य हवे आहे, हे आपल्यावर राज्य करणार्‍या ब्रिटिशांना कळावं, सार्‍या जगाला कळावं, आंतरराष्ट्रीय स्तरावर पोहोचावं ही वीर सावरकर यांची इच्छा होती. लंडनमध्ये येणार्‍या इतर देशांच्या क्रांतिकारकांना त्यांना भेटायचं होतं, शस्त्रे जमवायची होती, बॉम्ब तयार करायची कृती मिळवायची होती व पुढेही शस्त्रे व हे बॉम्ब बनवायची कला भारतातील आपल्या सहकार्‍यांपर्यंत पोहोचवायची होती आणि म्हणूनच ते लंडनला गेले. इकडे नाशिकमध्ये एकदा एका शेतकर्‍यास विल्यम नावाच्या अधिकार्‍याने खूप मारले. त्याच्या पोटात लाथा मारल्याने त्याच्या यकृताला जबर दुखापत झाली व पुढे दोन दिवसांत तो शेतकरी मृत्यू पावला. नाशिकच्या बाबासाहेब खरे या वकिलांनी या विरोधात आवाज उठवला आणि विल्यमविरूद्ध अभियोग भरावा लागला. पण, याचा काही उपयोग झाला नाही. ‘रणावीण स्वातंत्र्य कोणा मिळेना’ ही कविता आबा दरेकर अर्थात स्वातंत्र्यकवी गोविंद यांनी लिहिली होती आणि बाबाराव सावरकरांनी ही कविता छापून ‘अभिनव भारत’ संघटनेच्या सदस्यांना तसेच नाशिकमधील सर्व तरुणांना वाटली होती व घरोघरी त्या कवितेचे वाटप केले होते. ही घटना इंग्रजांनी लक्षात ठेवली होती.
    दि. २१ डिसेंबर, १९०९ रोजी नाशिकच्या विजयानंद नाट्यगृहात किर्लोस्कर मंडळींचा ‘शारदा’ नाटकाचा प्रयोग बघण्यासाठी नाशिकचा क्रूर जिल्हाधिकारी जॅक्सन आला होता. अनंत कान्हेरे, कृष्णाजी कर्वे, विनायक देशपांडे या तीन तरुणांनी जॅक्सनचा वध करण्याचा निर्णय घेतला होता. त्यानुसार सर्व नियोजित कट करून अनंत कान्हेरे या १७ वर्षीय युवकाने जॅक्सनचा गोळ्या घालून वध केला. यानंतर नाशिकमध्ये मोठ्या प्रमाणात ‘अभिनव भारत’च्या कार्यकर्त्यांची धरपकड सुरू झाली. नाशिकच्या अनेक तरुणांना या काळात अटक करण्यात आली व अत्यंत जुलूम-जबरदस्ती करून त्यांना कारागृहात बंदिस्त ठेवण्यात आले होते. अनंत कान्हेरेला दिलेले पिस्तुल हे लंडन येथून सावरकरांनीच पाठवले आहे, असा आरोप इंग्रजांनी केला व सावरकरांना अटक झाली.
    तत्पूर्वी ‘रणावीण स्वातंत्र्य कोणा मिळेना’ ही कविता केवळ छापली म्हणून बाबाराव सावरकरांना ‘अभिनव भारत‘ मंदिर, तिळभांडेश्वर गल्ली येथून नाशिकच्या सेंट्रल जेलपर्यंत अत्यंत अपमानास्पद वागणूक देऊन हातापायात बेड्या, तोंडाला काळे फासून बाबाराव सावरकर यांची धींड काढण्यात आली होती. नाशिकमध्ये ‘वंदे मातरम्’चा जयघोष केला म्हणून अनेक तरुणांना बेदम मारहाण करण्यात आली होती. या सर्वांचा बदला म्हणून अनंत कान्हेरेने जॅक्सनचा वध केला होता. यानंतर सावरकरांना अटक झाली. पुढे अंदमान येथे काळ्यापाण्याची शिक्षा देण्यात आली. यानंतर ११ वर्षे अंदमानात शिक्षा भोगल्यानंतर पुढे सावरकर बंधूंची सुटका झाली व त्यांना १३ वर्षे रत्नागिरीत स्थानबद्ध करण्यात आले. पुढे दि. १५ ऑगस्ट, १९४७ रोजी आपला देश स्वतंत्र झाला.
     दि. १० ते १२ मे, १९५२ मध्ये ‘अभिनव भारत’ संघटनेचा सांगता समारंभ पुण्याच्या एसपी कॉलेज येथे मोठ्या उत्साहात पार पडला. दि. १० मे, १९५३ या दिवशी वीर सावरकरांनी नाशिकला ‘अभिनव भारत मंदिरा‘ची स्थापना केली. ‘एक धक्का ओर दो पाकिस्तान तोड दो’ ही ऐतिहासिक घोषणा स्वातंत्र्यवीर सावरकरांनी नाशिक येथेच दिली होती. या दरम्यान नाशिकच्या सावरकरप्रेमींनी स्वातंत्र्यवीर सावरकरांची जंगी मिरवणूक काढली. वाद्यांच्या गजरात, फुलांच्या वर्षावात, गुलालाच्या उधळणीत ‘स्वातंत्र्यलक्ष्मी की जय, स्वातंत्र्यवीर सावरकरांचा विजय असो’ या घोषणांनी अवघे नाशिक दुमदूमून गेले. मिरवणूक ‘अभिनव भारत मंदिर‘ या वास्तूत आली.
    सावरकर व सर्व नाशिककर जनतेने येथे प्रवेश केला. नगरपालिकेच्यावतीने आयोजित समारंभात छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे अनावरण केल्यावर नाशिकच्या ‘अभिनव भारत मंदिर‘ या वास्तूत सावरकरांनी स्वातंत्र्यलक्ष्मीच्या मूर्तीची स्थापना केली होती. या देवीच्या चारही हातांमध्ये शस्त्रे आहेत. देवीच्या या स्वरूपाचं पूजन, ध्यान, मनन, चिंतन प्रत्येक भारतीयाने करावं, असे सावरकर यावेळेस म्हणाले होते. त्याचप्रमाणे याच वास्तूमध्ये १८५७च्या समरात ज्या वीरांनी हौतात्म्य पत्करलं अशा क्रांतिकारकांच्या आत्म्यांना शांती मिळावी व त्यांचे स्मरण कायम नवीन पिढीला व्हावे, या हेतूने सावरकरांनी एका तुळशी वृंदावनाची स्थापना केली. सावरकरांनी दि. ११ मे, १९५३ ला आपल्या जन्मगाव भगूर येथे आपल्या अष्टभुजा देवीचे दर्शन घेतले. आपल्या जन्मघराचे दर्शन घेतलं आणि तिथे भव्य व विराट अशी सभा झाली. यानंतर मात्र स्वातंत्र्यवीर सावरकरांचे येणे नाशिक व भगूर येथे कधी झाले नाही.

नाशिक येथील उत्खनन :-

 नाशिक शहराला सु. २५०० वर्षांचा इतिहास आहे. संस्कृत महर्षी पतंजली यांच्या महाभाष्य  या प्राचीन ग्रंथात ‘नासिक्यʼ असा उल्लेख आढळून येतो, तेच गाव म्हणजे नासिक होय. तदनंतर अनेक जैन, बौद्ध आणि हिंदू धार्मिक ग्रंथांमध्ये नासिकचा उल्लेख शहर, देश अथवा जनपद असा येतो. येथील कुंभारवाडा किंवा मातीची गढी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या भागात १९५०-५१ साली ह. धी. सांकलिया यांनी डेक्कन कॉलेज, पुणे ह्यांच्यामार्फत उत्खनन काम हाती घेतले. उत्खननाच्या आधी भगवानलाल इंद्रजी आणि एच. कझिन्स ह्यांनी सदर ठिकाणाचे गवेषण केले होते. शहरापासून १५ किमी. दक्षिण पश्चिमेस गंगावाडी येथे दगडी हत्यारे आढळून आली होती.


      त्याशिवाय उत्खननात एकूण पाच स्तरातून विविध कालखंडाचे पुरावे सापडले. पहिला कालखंड पुराश्मयुग, त्यानंतर ताम्रपाषाण युग, प्रारंभिक ऐतिहासिक कालखंड, इंडो-रोमन कालखंड आणि मोगल-मराठा कालखंड. नासिकमध्ये झालेल्या उत्खननात जोर्वे संस्कृतीचे अवशेष ऐतिहासिक युगाच्या आधीच्या स्तरात सापडल्याने त्याचा कालखंड काढणे सोपे झाले आणि ही ताम्रापाषणयुगीन संस्कृती नव्याने उजेडात आली. ताम्रापाषाणयुगीन संस्कृती बरोबरच प्रारंभिक ऐतिहासिक कालखंडाच्या दृष्टीने हे महत्त्वाचे स्थळ आहे.
नाशिक येथील उत्खननात आढळलेले मौर्यकालीन मृद्भांड्यांचे पुरावशेष.
      प्रारंभिक ऐतिहासिक कालखंडाचे मिळालेले अवशेष हे दोन काळातील होते. एक कालखंड इ. स. पू. २०० ते इ. स. ५०, तर दुसरा इंडो-रोमन कालखंड इ. स. ५० ते इ.स. २००. पहिला कालखंड सुद्धा दोन भागांमध्ये विभागला गेला होता. पहिल्या कालखंडामध्ये पोलादी निळसर रंगाची चमक (एन.बी.पी.डब्ल्यू) असलेली अशी भांडी, काळी आणि तांबडी मृद्भांडी, जाड काठ असलेली तांबड्या रंगाची मृद्भांडी अशा प्रकारचे विविध मृद्भांड्यांचे पुरावे मिळाले. त्या काळातील घरे ही मातीची बांधलेली होती, ज्यांची जमीन ही हिरव्या रंगाच्या मुरुमाचा वापर करून सारवलेली होती. दाराची लाकडी चौकट खोबणीत बसवून लाकडी दारे लोखंडी बिजागऱ्यांनी पक्की करीत. सांडपाण्याचा निचरा करण्यासाठी कूपाची सोय करण्यात आलेली होती. घराचे छत सुद्धा लाकडाचे बनलेले होते. मोठ्या आकारचे खिळे सदर उत्खननातून समोर आले. पहिल्याच कालखंडाच्या दुसऱ्या भागात साच्यात ओतून बनवलेली कोणताही लेख नसलेली अशी लेखरहित तांब्याची टंकित नाणी सुद्धा आढळली आहेत. ह्याच बरोबर शंखापासून तयार केलेल्या बांगड्या, गळ्यातले दागिने आढळून आले.
       ह्या कालखंडानंतर वरच्या स्तरावर इंडो-रोमन व्यापार काळातील महत्त्वाचे पुरावे होते. त्या काळात होत असणाऱ्या व्यापारामुळे रोमन बनावटीच्या अनेक वस्तू येथील लोकांच्या वापरात आलेल्या आढळून आल्या. त्यामधे अर्चनाकुंडे आणि अनेक रोमन बनावटीची मृद्भांडी आढळून आली. यामध्ये लाल तकाकीयुक्त (Red polished ware), काळ्या रंगाची रूलेटेड मृद्भांडी (Rouletted ware), लाल रंगाची सुबक बनावटीची आणि चाकावर घडवलेली, मेगारॉन (Megaron ware) मृद्भांडी ज्यांत प्रामुख्याने थाळ्या आणि वाडगे आढळून आले. ह्या काळातील घरे ही पक्क्या भाजलेल्या विटांची, लाकडी छप्पर असलेली असावीत. विटांचा आकारही मोठा होता. पश्चिमी क्षत्रप राजा नहपान आणि सातवाहन कालखंडाशी जुळणारा हा कालखंड असावा, असा अंदाज सांकलिया ह्यांनी मांडला. काही मातीच्या भांड्यांवर ब्राह्मी लिपीतील अक्षरे आढळून आली. नासिक शहरात असलेली पांडव लेणी ही सातवाहन काळाशी निगडित असल्याचे पुरावे लेणीमध्ये असलेल्या लेखांमुळे समोर आलेले आहेत.
      ह्या दोन्ही कालखंडांत लोह आणि तांबे ह्या धातूंचा वापर विविध प्रकारची हत्यारे बनवण्यासाठी मोठ्या प्रमाणात झालेला आढळून येतो. हत्यारे, मृद्भांडी ह्यांच्याबरोबरच मातीची खेळणी, काही आकृत्या, तसेच काही कमी मौल्यवान दगडांपासून बनवलेले विविध अलंकार आढळून आले.  ह्या अवशेषांवरून हे शहर प्रारंभिक ऐतिहासिक कालखंडातील एक महत्त्वाचे असे सामाजिक, आर्थिक केंद्र असल्याचे लक्षात येते.
Nashik District in 1883.

नाशिकच्या इतिहासातील महत्वाचे टप्पे  :-

१ )  इ.स.१०५-१०६ च्या दरम्यान नहपान या क्षत्रपाने सातवाहन राज्यकर्त्यांना हुसकावून लावले.
२ )  इ.स १२४-१२५ च्या दरम्यान नहपानाचा पराभव करून त्याचा समूळ नाश केला.नहपानाच्या काळात गोवर्धन हे जिल्ह्याचे मुख्य ठिकाण होते.
३ )  इ.स ४५-४६ च्या काळात शक-सातवाहन यांच्यात संघर्ष झाला.
४ ) इ.स ८०-१२५ हा क्षत्रप वर्चस्वाचा कालखंड होता. त्याचप्रमाणे
५ ) इ.स.१२५-२०० हा कालखंड सातवाहनांचा होता. याच वेळेस आभीर राजवटीने वर्चस्व गाजवलेले दिसते. आभीर हे या प्रदेशातील गवळी होते. अंजनेरी ही त्यावेळची राजधानी होती. प्रारंभी ती क्षत्रपांची होती.
६ )  इ.स.३२१ ते ३८४ पर्यंत मौर्य साम्राज्याचे या भागावर वर्चस्व होते. त्यानंतर आभिरांच्या हाती सत्ता गेली. सहाव्या शतकाच्या प्रारंभी चालुक्यांनी हा प्रदेश हस्तगत केला. त्यानंतर राठोडांची सत्ता आली. त्यांनी नाशिक जिल्ह्यातील मयुरखंडीला नाशिकची राजधानी बनविले. नवव्या व दहाव्या शतकापर्यंत हा प्रदेश राष्ट्रकुटांच्या अधिपत्याखाली होता. यादव वंशाच्या राज्य स्थापनेनंतर त्यांनी देवगिरी किल्ला ही राजधानी केली.
७ )   इ.स.१३०६ रामदेवानाही देवगिरीच्या दिल्लीच्या सत्तेचे मांडलिक म्हणून राहील म्हणून मान्य केले. व बागलाण प्रदेश आपल्या राज्यात समाविष्ट केला.
८ )  इ.स १३४७ हा प्रदेश बहामनी साम्राज्याचा दौलताबाद उपप्रांताच्या अखत्यारीत आले. खिलजी व मलिक कपूर यांच्या वीस वर्षांच्या राजवटीनंतर दिल्लीच्या सुभेदाराच्या अखत्यारीतला हा प्रदेश बहामनी राजवटीत इ.स. १३४७-१४९० पर्यंत होता. इ.स.१३६६मध्ये बागलाण प्रांताचा प्रमुख गोविंददेवाने महमद शहा बहामनी विरुद्ध मराठ्यांचे बंड घडवून आणले.
९ ) इ.स.१४९०-१६३६ बहामनी सत्तेच्या पाडावानंतर नगरच्या निजामशाही सुल्तानात समाविष्ट झाला.
अहमदनगरच्या निजामशाही सत्तेनंतर हा प्रदेश औरंगजेबाच्या मोगल सुभेदारीत समाविष्ट झाला. मुस्लिम कालखंड पुढील प्रमाणे:- इ.स.१२९७ अल्लाउदिन खिलजीच्या काळात त्याचा सेनापती उलुघखान याने नाशिकच्या बागलाण परिसरात स्वतःला राज्यकर्ता म्हणून घोषित केले.
१० )  इ.स.१६०९मध्ये नाशिक प्रदेश मिया राजू ह्यांच्या नियंत्रणाखाली आला.
११ ) १६१५ मध्ये, हे शहर निजामशहा सुलतानकडून मुघलांनी ताब्यात घेतले आणि त्याचे नाव "गुलशनाबाद" ठेवले.
१२ )  इ.स.१६३२पर्यंत मोगलांनी दख्खन, वऱ्हाड, खानदेश या प्रांतांसह नाशिकमध्ये मोगल साम्राज्याचा पाया पक्का केला.
१३ )  इ.स.१६८२पर्यंत मोगलांनी बरेच विजय मिळवले. शहजादा महमद आझम या अनुभवी सरदाराची नेमणूक बहादूरगड आणि गुलशनाबाद (नाशिक) येथेकेली.
१४ )  इ.स.१६८८मध्ये मतबर खान नावाच्या बलाढ्य सरदाराची नेमणूक झाली.
१५ ) इ.स.१६९६मध्ये मराठ्यांनी नाशिकच्या काही भागात अंमल बजावला.
१६ ) इ.स.१७०७पर्यंत म्हणजेच औरंगजेबाचे मृत्यूपर्यंत हा भाग मोगलांच्या ताब्यात होता.यामध्ये झुल्फिकार खान, ममार खान, मतबर खान आदी अधिकारी नाशिक-खानदेशवर नियुक्त होते. शाहूंच्या सुटकेनंतर स्थिरस्थावर झाल्यावर शाहूंचे पेशवे बाळाजी विश्वनाथांनी दिल्ली करारात मोगलांकडून दख्खनची चौथाई सरदेशमुखी मिळवली. त्यात तत्कालीन नाशिक जिल्ह्याच्या उत्तरेकडील भागाचाही समावेश होता.  बागलाण गाळणा भागात दाभाड्यांची पकड होती. इ.स.१७३१ च्या काळात पहिल्या बाजीरावचे नाशिक, पेठ, या भागांवर वर्चस्व होते
१७ ) १७३४: 'गुलशनाबाद' शहराला 'नाशिक' असे नाव देण्यात आले.
१८ )  इ.स.१७४७पर्यंत म्हणजेच औरंगजेबाच्या मृत्यूपर्यंत हा भाग मोगलांच्या ताब्यात होता.
१९ )  इ.स.१७४७ नंतर नाशिकवर मराठ्यांचा पूर्ण अंमल झाला. सरदार नारोशंकर राजे बहादर ह्यांनी रामेश्वर मंदिर बांधून नारोशंकराची घंटा बांधली.
२०) १७३८ साली कपालेश्वर मंदिर बांधले.
२१ )  सरदार चंद्रचूड यांनी १७५६मध्ये सुंदरनारायण मंदिर बांधले.
२२ ) काळाराम मंदिराच्या जीर्णोद्धाराचे काम १७९० साली सरदार आडेकरांनी पूर्ण केले.
२२ ) १७४८ मध्ये निजाम-उल-मुक्त आसफ जहा वारल्यानंतर त्यांचा मुलगा नासीर युंग सत्तेवर आला. व बाजीराव यांच्या मृत्यूनंतर त्यांचे ज्येष्ठ पुत्र नानासाहेब पेशवे पदावर विराजमान झाले. तरीही निजाम व मराठ्यांचे वाद होताच. इ.स.१७५१ मध्ये नसीर यांगचा खून झाल्यावर निजामाचा तिसरा पुत्र गादीवर आला. त्याने फ्रेंचांच्या मदतीने औरंगबादवरून मराठ्यांवर चाल केली. परंतु मराठ्यांनी त्याला इ.स.१७५२ च्या शांतता करारान्वये परतून लावले. ह्या करारानुसार गोदावरी व तापी नदीमधील खानदेशचा पूर्ण भाग मराठ्यांचा सत्तेत आला. पहिल्या निजामाच्या मृत्यूनंतर पेशव्यांनी १७५१ मध्ये नासिक हे नाव पुन्हा सुरू केले.
२३ ) इ.स.१७६०-६१ मधील सलाबात जंगच्या पराभवानंतर नासिक हे पेशवाईतील प्रमुख ठिकाण बनले.
२४ ) इ.स.१७६१ नानासाहेबाच्या मृत्यूनंतर माधवराव पेशवे पदावर आले.
२५ ) इ.स.१७६३ विनायकरावाने पेशवे प्रदेशातील नाशिक, जुन्नर, संगमनेर शहरांची लयलूट केली. यानंतर पेशव्यांनी बालाजी सखाराम यांना बागलांचा सरसुभेदार नेमले.
इ.स.१८१८ पर्यंत हा भाग पेशव्यांचा हाती होता. पण १८१८ मध्ये थोमस हिस्लॉपच्या ब्रिटिश सैन्याने कोपरगाव घेतले. चांदवडच्या उत्तरेकडील भाग जिंकला. ७ मार्च १८१८ खानदेशातील थाळनेर, चांदवड किल्ला जिंकून १८१८ मार्च अखेर होळकरांच्या नाशिकवर पूर्ण ताबा मिळवला.
२६ )  इ.स.१८६१ मध्ये ॲंग्लो व्हर्नॅक्युलर स्कूलची स्थापना झाली.
२७ ) इ.स.१८६४ मध्ये नाशिकला नगरपरिषदेचा दर्जा मिळाला.
२८ )  इ.स.१८६४ मध्ये नाशिकला नाशिक वृत्त नावाचे वर्तमानपत्र चालू झाले.
२९ ) १८६९: नाशिक जिल्हा स्थापन.
३० ) इ.स.१८७७ मध्ये गोपाळ हरी देशमुख यांचे नाशिकमध्ये आगमन झाले.
३१ ) इ.स.१८७७ मध्ये नाशिकच्या सार्वजनिक जीवनात न्यायमूर्ती रानडे यांचे आगमन
३२ ) इ.स.१८९९ मध्ये सावरकरांनी गुप्तपणे नाशकात राष्ट्रभक्त समूह नावाची समाजाची स्थापना झाली. मित्रमेळा नावाची संघटना नाशिकचे नाव झळकावू लागली.
३३ ) वीर सावरकर इंग्लंडला गेले.त्यांनी मित्रमेळाचा कारभार तेथून सांभाळला.
३४ )  टिळकांनी ३१ मे १९०७ साली सरकारच्या रिस्ते सर्क्युलरला विरोध करण्यासाठी नाशकात सभा घेतली.
३५ )  मित्रमेळात औरंगाबादच्या अनंत कान्हेरेचा समावेश झाला.
३६ ) २१ डिसेंबर १९०९ रोजी जुलमी जिल्हाधिकारी जॅक्सनला गोळ्या घातल्या.
३७ ) जॅक्सन खून प्रकरणात कृष्ण गोपाळ कर्वे, नारायण जोशी, गणेश जोशी यांची चौकशी झाली.
३८  २९ मार्च १९१० रोजी कान्हेरे, कर्वे, देशपांडे यांना फाशी देण्यात आली. त्यांचे स्वातंत्र्यलढ्यातील योगदान फार मोठे होते..
३९ )  सावरकरांना तुरुंगात डांबण्यात आले.
४० )  २५ फेब्रुवारी १९६६ साली ८३ व्या भारताच्या या महापुत्राने योगसमाधी घेतली.
४१)  बाबासाहेब अंबेडकरांचे नाशिक मधील योगदान महत्त्वाचे होते.
४२ )  १९३० मध्ये काळाराम मंदिरात दलितांच्या प्रवेशासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली सुरू झालेला नाशिक सत्याग्रह नाशिकमध्ये झाला.हा सत्याग्रह देशभर गाजला.
४३ )  १९३१ मध्ये, दुसऱ्या गोलमेज परिषदेत बाबासाहेब सहभागी होणार होते त्या संदर्भात चांभारांची भूमिका ठरवण्यासाठी मुंबई प्रांत चर्मकार परिषदेची बैठक नाशिकमध्ये आयोजित करण्यात आली होती.
४४  ) १९३२ मध्ये, बाबासाहेबांनी नाशिकमध्ये अस्पृश्यता निर्मूलनासाठी मंदिर प्रवेश चळवळ आयोजित केली.

नासिक हिरा

     जगभरात हिऱ्यांचा एकमेव स्रोत होता तो म्हणजे भारत देश. साधारण हजारो वर्षांपासून संपूर्ण जग हिऱ्यांसाठी भारतावर अवलंबून होते. कोहिनुर, द ऑरलॉफ, द ग्रेट मुगल, सेंसी होप, फ्लोरटाइन, रिजेंट, पिटली, निजाम या व यांसारख्या असंख्य हिऱ्यांनी जगाला मोहिनी घातली. असाच एक हिरा आहे जो कोहिनुर हिऱ्यापेक्षाही मौल्यवान असून इंग्रजांनी भारतातून पळवून इंग्लंडला नेला. त्या हिऱ्याचं नाव आहे नासिक हिरा ‘आय ऑफ गॉड शिवा’ 'नासक' ह्या नावानं आजहि ओळखल्या जाणाऱ्या हिऱ्याचं हे नाव आपल्या नाशिक ह्या गावावरून पडलेलं आहे. ह्या नावामागे मराठेशाहीच्या अस्ताच्या दिवसांतले आणि कोणास फारसे माहीत नसलेले मनोरंजक तपशील दडलेले आहेत. ह्या हिऱ्याला हे नाव का पडलं ह्याची प्रचलित कथा अशी आहे की हा हिरा कोणे एके काळी त्र्यंबकेश्वराच्या देवळाच्या संपत्तीचा भाग होता. दुसऱ्या बाजीरावानं तो तेथून आपल्या ताब्यात घेतला आणि त्याच्याकडून विजेत्या इंग्रजांनी तो मिळवला. हिऱ्याचे मूल्य वाढविण्यासाठी कोणीतरी बुद्ध्याच बनवलेली अशी ही कपोलकल्पित कथा दिसते.
       या नासिक हिऱ्याची गोष्ट सुरु होते १८१८ सालात. पण त्या आधीचा ही इतिहास आहे या हिऱ्याला. म्हणजे मराठेशाहीच्या अस्तापासूनच नव्हे तर त्यापूर्वी ही सहाशे सातशे वर्षांपूर्वी केव्हातरी हा हिरा अस्तित्वात आला. केव्हातरी म्हणजे पक्के साल सांगायला तो इतिहास आता काळाआड गेला आहे. इतिहासाच्या स्मृतीपटलावर त्या खाणाखुणाही आता दिसेनाशा झाल्या आहेत.
      नक्की साल माहित नसले तरी हा नासिक हिरा हा १३ ते १४ व्या शतकात तेलंगाणातल्या  महबूबनगरजवळ अमरागिरी खाणीत सापडला असे म्हंटल जातं. ( थोडे भारतात सापडणार्या हिर्याविषयी - १७२६ सालापर्यंत भारत हा हिऱ्यांचा एकमेव मोठा सोर्स होता. जगात दुसरीकडे कुठेच हिऱ्यांच्या खाणी नव्हत्या. ब्रासिल आणि साऊथ आफ्रिका इथे खाणी नंतर सुरु झाल्या. कुतुबशाही राज्यांची राजधानी गोलकुंडा किल्लयाच्या पायथ्याशी असलेल्या बाजारपेठेत हिऱ्याची विक्री होत असे. पण तेथे हिरे सापडत नसत. तेथून जवळ वाहणाऱ्या कृष्णा आणि पालार या नद्यात वाहत येणाऱ्या वाळूतून पॅनिंग करून ते निवडले जात . गोलकुंडा अथवा त्या जवळपास कुठेही हिऱ्याच्या 'खाणी' नव्हत्या.पन्ना येथे हिऱ्यांची खाण होती.किंबरलाईट नावाचा एक अश्मांचा प्रकार आहे. त्यात हिरे नैसर्गिकरीत्या असू शकतात. अशा दगडामध्ये हिऱ्या खाणी असतात. पन्ना जवळ माझगाव येथे अशा प्रकारचे दगड आहेत. कृष्णा व पलार या नद्यांच्या उगमा पर्यंतच्या भागा पर्यंत हे दगड असायला पाहिजेत. पण अजून पर्यंत सापडलेलेले नाहीत . फार पुरातन असल्याने त्यांची खूप झीज झाली असणार. दगडांची वाळू झाल्यावर ती वाळू आणि तिच्याबरोबर न झिजणारे खडे ( हिरे ) नदीच्या पात्रात वाहत जात असले पाहिजेत.  जगभरचे व्यापारी भारतातून हिरे विकत घेत. तावर्निए अथवा बर्नियर हे परकिय प्रवासी भारतात हिऱ्यांच्या शोधात आले होते. गोवळकोंड्याचा राज्याची जी खंडणी मोगलांना जात असे त्यात हिरे असत.
       जहांगीर बादशाहने आपल्या रोजनिशीत आपल्या मुलात कोणते गुण आहेत ते लिहिले आहे - त्याचा मुलगा बाबा खुर्रम (म्हणजे शहाजहान) याला हिऱ्यांची उत्तम पारख होती. (ती डायरी मोठी मजेशीर आहे पण तो वेगळा विषय आहे) असा हिऱ्यांचा खजिना अकबर, जहांगीर आणि शहाजहान यांनी सतत १०० वर्षे जमवला होता. औरंगजेबाला जमवण्यात काही रस नव्हता पण त्याने आहे तो जपून ठेवला. मग १७३९ साली नादिरशाहने सगळी रत्ने लुटली. ती शीख, इराणी, रशियन, अफगाण आणि आता कतार, कुवेत इथेही सापडतात. काही पाचूंवर आपल्याला या सगळ्या मालकांची नवे कोरलेली सापडतात (अकबर - जहांगीर - शहाजहान - औरंगझेब - नादीर शाह अफसर - अहमद शाह अब्दाली) त्यातून आपल्याला हा इतिहास कळतो.  आज जसे लोक गुंतवणूक म्हणून सोने अथवा जमीन घेतात तसा हिरे हा मातबर लोकांसाठी एक गुंतवणुकीचा मार्ग होता आणि स्वतःचा मोठेपणा दाखवण्याचा मार्ग देखील. मराठ्यांनी निझामाला नमवून बऱ्याचदा खंडणी घेतली. इतरही प्रांतात दरवर्षी चौथाई वसूल केली. त्यामुळे त्यांच्याकडे १०० वर्षांच्या राजवटीत पैसे आणि हिरे जमलेच होते. पुष्कळदा सैनिकी खर्च वारेमाप होई आणि उत्पन्न पुरे पडत नसल्यामुळे कर्ज घायची वेळ येई ती गोष्ट वेगळी, पण खेळते भांडवल बरेच होते. )
  त्यानंतर तो म्हैसूर राजाच्या खजिन्यात दाखल झाला. म्हैसूरचा खजिना हिऱ्यांनी भरलेला होता. पुढं मुघल आक्रमकांनी  म्हैसूरचा खजिना लुटला. त्यानंतर नासिक हिरा मुघलांच्या खजिन्याची शान बनला. 
पुढं पेशव्यांनी दिल्लीवर ताबा मिळवल्यानंतर मुघलांचा जामदारखाना पेशव्यांच्या ताब्यात यावा म्हणून पेशव्यांचे सरदार त्रिंबक सूर्याजी प्रभू यांनी त्र्यंबकेश्वरला नवस केला होता. त्र्यंबक गड  ताब्यात आल्यावर नवसाची परतफेड म्हणून पेशव्यांनी १२ ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेल्या त्र्यंबकेश्वराला मुघलांच्या खजिन्यातला सोन्याचा रत्नजडित मुकुट आणि हिरे जडजवाहिर शिवाला अर्पण  केले.त्यावेळी नासिक हिरा त्र्यंबकेश्वरच्या खजिन्यात दाखल झालं. नाशिकचा शिरपेच असलेल्या त्र्यंबकराजाच्या मुकुटात हा हिरा विराजमान झाल्याचे म्हंटले जाते. त्यामुळेच इंग्रजांनी नासिक हिऱ्याला शिवाचा तिसरा डोळा ‘आय ऑफ गॉड शिव’ असे म्हंटले असावे. या मुकुटात हा हिरा होता, मात्र आता त्र्यंबकेश्वराच्या मुकुट पहिला तर त्यात कुठेही हिरा बसेल अशी जागा दिसत नाही.हा हिरा मूळ ज्या त्र्यंबकेश्वर मंदिरातील मुकुटामधून काढून घेण्यात आला होता, तो मुकुट दर सोमवारी संध्याकाळी चार ते पाच या वेळामध्ये दर्शनासाठी खुला करण्यात येतो. या मुकुटामध्ये जडविलेली इतर रत्ने त्यावर जशीच्या तशी असली, तरी या मुकुटाची शान असलेला नासक हिरा मात्र आज त्या मुकुटावर नाही.
     याचा अर्थ हा हिरा त्र्यंबकेश्वरच्या खजिन्यात नव्हता. मात्र नासिक हिरा त्र्यंबकेश्वरमध्ये म्हणजे शिवाच्या नगरीत मिळाल्याने इंग्रजांनी त्याची नोंद ‘आय ऑफ गॉड शिवा’ अशी केलेली दिसते. हा हिरा मिळण्याची दुसरी शक्यताही व्यक्त केली जाते ती म्हणजे शेवटच्या पेशव्यांच्या खजिन्यात हा मिळाला असावा. पेशव्यांच्या खजिन्याची जबाबदारी त्र्यंबकेश्वरमधील ज्या व्यक्तीकडे होती त्याच्याकडून तो इंग्रजांनी लुटला.
 
नासक हिरा
 
       सन १८११ मध्ये पुण्यात ईस्ट इंडिया कंपनीचा रेसिडेंट म्हणून दाखल झालेल्या माउंटस्टुअर्ट एल्फिस्टनने मराठ्यांच्या नसा आणि बळ नेमके कशात आहे हे शोधायला सुरवात केली. सरदारांमध्ये फूट कशी पडता येईल, विश्वासू माणसांना कस नामोहरम करता येईल आणि त्याचबरोबर मराठ्यांकडे नेमकी किती संपत्ती आहे? कोठे आहे? हेही हेरण्याचं काम सुरु होत. याचदरम्यान नाशिकमध्ये असणाऱ्या कॅप्टन ब्रिग्जच्या ( ह्याच कॅ. ब्रिग्ग्सने १८१८ साली नाशिकमधील काही किल्ले पायर्‍यामार्ग फोडून उद्ध्वस्त केले. मात्र तो त्र्यंबकेश्वजवळील हरिहर किल्ला जिंकण्यासाठी आला असता त्याला हरिहरच्या आभाळात घुसलेल्या पायर्‍यांनी इतके प्रभावित केले की त्याने हा पायरीमार्ग उद्ध्वस्त केलाच नाही. आजही इकडील बहुतेक किल्ल्यांचे पायरीमार्ग उद्द्वस्त झाले असता हरिहरच्या देखण्या पायर्‍या आजही पाहता येतात )   हाती नाशिकमध्ये एक मोठा खजिना लागला. हा खजिना होता त्रिंम्बक डेंगळे, म्हणजे दुसऱ्या बाजीरावांच्या सेनापतींचा. या खजिन्यात सोन्याचांदीचे ६५ हजारांचे दागिने मिळाले. खडकीच्या लढा‍ईत पराभव झाल्यानंतर दुसऱ्या बाजीराव पेशव्यांनी १७ नोव्हेंबर १८१७ ह्या दिवशी पुणं सोडलं आणि पेशवे पुढं आणि इंग्रज मागं अशी शर्यत सुरू झाली. पेशवे पुण्याहून प्रथम नाशिक-खानदेशाकडं गेले. तेथून चांद्याकडं आणि अखेरीस उत्तरेकडं पेशवे सरकत असतांना अखेर सर जॉन माल्कम -( यानेच महाबळेश्वरातील माल्कमपेठ वसवली )  ह्यानं त्यांना गाठलं आणि अखेर पेशव्यांनी सत्ता सोडून बिठूरास पेन्शन घे‍ऊन राहण्याचं मान्य केलं. बाजीरावांची संपत्ती राजकीय मालमत्ता होती.  पेशव्यांची खाजगी मालमत्ता इंग्रजांनी लढाईतली लूट म्हणून ताब्यात घेतली.

        पुढे २९ एप्रिल १८१८ रोजी कर्नल मॅक्डोवेलने कॅप्टन ब्रिग्जला बाजीरावांचे काही लोक जंगलातून काही घेऊन जात असल्याची माहिती मिळाल्याचा निरोप दिला. मात्र ब्रिग्जने या करवाईतून आपल्याला बक्षीस मिळणार नाही म्हणून ती टाळली. त्यानंतर १ मे १८१८ रोजी एलफिन्स्टनने खासगी पत्राद्वारे नाशिकमध्ये बाजीरावाची संपत्ती असल्याची माहिती दिली. इंग्रजांच्या वतीनं कमिशनर म्हणून पुण्यातून मा‍उंटस्ट्यु‍अर्ट एल्फिन्स्टन सूत्रं हलवीत होता. त्याला कोठूनतरी बातमी लागली की उत्तरेकडं सरकतांना पेशव्यांनी नाशिकला एका विश्वासू व्यक्तीच्या घरात काही जडजवाहिर लपवून ठेवलं आहे. बातमी कळताक्षणी त्यानं आपल्या हाताखालच्या कॅ. ब्रिग्जला हे जडजवाहिर शोधून ताब्यात घेण्याची कामगिरी सोपविली. कॅ. ब्रिग्ज लगोलग नाशिकास रवाना झाला.  कॅप्टन ब्रिग्ज स्वतःच त्र्यंबकेश्वर मध्ये दाखल झाला आणि त्या व्यक्तीच्या घराचा शोध घे‍ऊन त्यानं घराची खणती केली. अपेक्षित घबाड त्याच्या हाती लागलं. हे घडलं २ मे १८१८ च्या रात्री.  त्यांच्या घरातून प्रचंड खजिना मिळाला. यात शुद्ध सोन्याची साधारण ४ किलो म्हणजे ३५० तोळे वजनाची शेषशायी विष्णूची प्रतिमा, कमरबंद, बांगड्या, मौल्यवान पाचू, रत्ने, सोन्याचे हार, पूजेची चांदीची भांडी, एक चौरंग इत्यादी गोष्टी होत्या. याव्यतिरिक्त अनेक पेटारे होते, की जे खोलण्यात आले नव्हते, ज्यात एवढ्या सोन्याच्या मोहरा व रत्ने होती. ज्याची मोजदाद करणे शक्य नव्हते. इंग्रजांनी लुटलेल्या संपत्तीत ९० कॅरेटचा एक हिराही होता. हा हिरा नासिकमध्ये मिळाल्याने कॅप्टन ब्रिग्जने या हिऱ्याची नोंद करताना त्याला नासिक हिरा असे म्हंटले.  लुटीच्या या नासिक हिऱ्याची गणना १९३० मध्ये जगातल्या प्रमुख २५ हिऱ्यांमध्ये केली गेली.  ब्रिग्ज यांनी हा हिरा भारताचे तत्कालीन गव्हर्नर जनरल मार्केस ऑफ हेस्टींग्ज यांना सुपूर्त केला. त्यानंतर हा हिरा मराठ्यांकडून जप्त झालेल्या इतर मौल्यवान संपत्तीच्या सोबत इंग्लंडच्या दरबारी पाठविण्यात आला. हा हिरा लंडनमध्ये विक्रीसाठी उपलब्ध झाल्यानंतर केवळ ३००० पाउंड्स रक्कम देऊन ‘रंडेल अँड ब्रिज’ नामक हिरे व्यापाऱ्यांनी हा हिरा खरेदी केला. त्यानंतर या हिऱ्याला पुनच्श पैलू पाडून नव्या रूपातील हा हिरा ड्युक ऑफ वेस्टमिन्स्टर यांना विकण्यात आला. त्यांनी हा हिरा त्यांच्या तलवारीवर जडवून घेतला.
          ह्या घटनाक्रमाला आधार आहे तो म्हणजे 'डेक्कन प्रा‍ईझ मनी' बाबतचा तत्कालीन इंग्रजी वृत्तपत्रांमधून वेळोवेळी आलेला मजकूर. कोणाच्या घरात हा ऐवज दडविण्यात आला होता हे नाव आज कळू शकत नाही.
         'डेक्कन प्रा‍ईझ मनी' म्हणजे काय? तत्कालीन रिवाजानुसार परपक्षाचा पराभव झाल्यावर त्या पक्षाची जी काही दौलत विजेत्यांच्या हातात पडेल तिचे सैनिकांमध्ये वाटप करून सैनिकांना खूष ठेवण्याची पद्धत युरोपात रूढ होती. अशा लुटीमध्ये सर्वोच्च राजसत्तेपासून मोहिमेत भाग घेतलेले सर्व अधिकारी आणि सामान्य सैनिकांपर्यंत प्रत्येकाचा दर्जानुसार वाटा असे. हे वाटप कसे करायचे ह्याचेही नियम ठरलेले होते. तदनुसार किरकोळ मूल्याच्या वस्तू जागीच विकून सर्वसामान्य सैनिकांमध्ये ती रक्कम वाटत असत. अधिक मौल्यवान वस्तू, विशेषेकरून जडजवाहिर आणि हिऱ्यांसारख्या वस्तु, इंग्लंडला पाठवून तिथं त्या सरकारजमा होत आणि कालांतरानं योग्य किमतीला त्या विकून त्या रकमेचंहि वाटप होत असे. पेशवा‍ईच्या अस्तानंतर अशा प्रकारे नागपूरकर भोसले, होळकर आणि पेशवे ह्यांच्याकडून इंग्रजांनी बरीच लूट ताब्यात घेतली. त्यांपैकी मौल्यवान अशा वस्तु आणि जडजवाहिर इंग्लंडमध्ये पाठवलं. हाच 'डेक्कन प्रा‍ईझ मनी. ह्या रकमेचं व्यवस्थित वाटप व्हावं म्हणून ती ड्यूक ऑफ वेलिंग्टन आणि कर्नल अर्बथनॉट ह्यांच्या ताब्यात विश्वस्त म्हणून देण्यात आली. विश्वस्तांचं ऑफिस ८ रीजंट स्ट्रीट इथं होतं. विश्वस्तांनी आपलं काम कसं केलं ह्याचे अनेक तपशील इंग्लंडमधील तत्कालीन वृत्तपत्रांमधून वाचायला मिळतात. ड्यूक ऑफ वेलिंग्टनकडं हे काम सोपवलं जाण्याचं कारण म्हणजे त्या काळात त्यांच्या नावाचा फार मोठा दबदबा होता. नेपोलियनवर नुकताच विजय मिळवून त्यांनी आपलं इतिहासातलं स्थान पक्कं केलं होतंच. ह्याशिवाय दुसऱ्या इंग्रज-मराठा युद्धात त्यांचा महाराष्ट्राशी चांगलाच परिचय झालेला होता.
nasak1
            थोडक्यात म्हणजे मराठ्यांच्याबरोबरच्या अखेरच्या लढा‍ईत इंग्रजांच्या हातात एक खूप मोठी रक्कम आली आणि तिचं वाटप करण्यासाठी तिच्यातला महत्त्वाचा भाग इंग्लंडमध्ये पोहोचला. लुटीतल्या बऱ्याच गोष्टी जागीच विकून रकमेचं वाटप केलं होतं. निवडक निवडक वस्तु ज्या इंग्लंडला गेल्या त्यांमध्ये 'नासक' हिराहि होत. १६ मार्च १८२१ च्या एका वृत्तपत्रात असं नाव दिलेला एक मोठा हिरा इंग्लंडात ये‍ऊन पोहोचल्याचा उल्लेख मिळतो. ह्या उल्लेखावरून असं वाटतं की हिरा नाशिकला मिळाला म्हणूनच त्याला 'Nassuck' हे नाव मिळालं. इथं हे लक्षात घ्यायला हवं की तेव्हांच्या सर्व इंग्रजी लिखाणात नाशिकचा उल्लेख Nassuck असाच केलेला आढळतो. ह्या सर्व खजिन्याची योग्य ती विल्हेवाट लावण्यासाठी विश्वस्तांना बरीच वर्षं मेहनत घ्यावी लागली. पुढची पंधरा‍एक वर्षं तरी हे काम चालू असल्याचं दिसतं.
           एव्हढा वेळ लागायचं कारण असं की प्रत्यक्ष लूट घेतांना जागेवर असलेले आणि जागी नसलेले तरी ज्यांचं लुटीमध्ये योगदान होतं अशा दोन्ही गटांना वाटा घेण्याचा अधिकार होता पण कोणाचा किती वाटा ह्याबद्दल बरेच मतभेद होते. एकूण मोहिमेचा प्रमुख जनरल हिस्लॉप आणि त्याचा राजकीय वरिष्ठ कलकत्तेकर गवर्नर-जनरल मार्क्विस ऑफ हेस्टिंग्ज ह्या दोघांमध्ये बरेच मतभेद होते. हिस्लॉपची तक्रार होती की आपल्या मागणीकडं पाहण्याचा ड्यूक ऑफ वेलिंग्टनचा दृष्टिकोण उपेक्षेचा आणि तुच्छतेचा आहे. नाशिकच्या खणतीच्या दिवसातला तिथं उपस्थित असलेला अधिकारी कर्नल मॅकडॉवेलची तक्रार होती की पुण्याहून आलेल्या ब्रिग्जनं त्याला अंधारात ठे‍ऊनच आपला कार्यभाग साधला आणि त्याला न्याय्य हिश्श्यापासून वंचित ठेवलं. अशा एक ना दोन अनेक वादांमुळं हे प्रकरण पुढं पंधरा‍एक वर्षं खदखदत होतं. वृत्तपत्रांमधून आणि पार्लमेंटात अनेकदा त्यावर प्रश्न विचारले गेले. अखेरीस १८३६-३७ साली प्रकरण अखेरीस मार्गी लागलं आणि 'नासक' हिरा विकायला बाहेर आला.
          अशी अनेक वादांच्या भोवऱ्यात सापडलेली रक्कमहि तशीच जबरदस्त असली पाहिजे. एका ठिकाणी उपलब्ध असलेल्या माहितीनुसार ती ७२ लाख रुपये इतकी होती. त्यावेळेस सोन्याचा भाव १८-१९ रुपये तोळा होता असं धरलं तर आजच्या किमतीनं ह्या लुटीची किंमत ६-७ अब्जाच्या घरात जाते. हे जरा ढोबळच अनुमान आहे पण रक्कम खूपच मोठी होती एवढं कळायला पुरेसं आहे.
           आणखी एका वादाचा इथं उल्लेख करायला हवा. सिंहगड किल्ला २ मार्च १८१८ ह्या दिवशी पाडाव झाला आणि मराठ्यांनी किल्ला खाली केला. त्यावेळी ठरलेल्या अटींनुसार किल्ल्यातील लोकांना केवळ आपापले वैयक्तिक सामान बाहेर काढण्याची अनुमति देण्यात आली होती. नारो गोविंद औटी नावाचा बाजीरावाचा विश्वासू किल्ल्यात होता आणि तो बाहेर पडताना त्याच्याजवळ सोन्याच्या नाण्यांनी भरलेले चार पेटारे होते. ह्या नारो गोविंदाचा सर्व इंग्रजी लिखाणामध्ये केलेला उल्लेख Narroba Govind Outia असा आहे. नारो गोविंदच्या दाव्यानुसार ती सुमारे ३६ लाखाची मालमत्ता त्याची खाजगीतली होती. इंग्रजांना शंका होती की मालमत्ता बाजीरावाची असली पाहिजे आणि तसं असलं तर तिच्यावर विजेते म्हणून त्यांचा अधिकार होता. ती त्या जागी जप्त केली गेली पण नारो गोविंद आणि इंग्रजांच्यातील हा वाद बरेच वर्षं चालू रहिला. मध्यन्तरी केव्हातरी नारो गोविंदाचा मृत्यु झाला पण त्याच्या वतीनं दोघा मारवाडी व्यक्तींनी दावा पुढं चालू ठेवला. हा दावा त्यांनी रोख पैसे दे‍ऊन बहुधा नारो गोविंदाच्या पुढच्या पिढ्यांपासून विकत घेतला असला पाहिजे. आश्चर्याची गोष्ट अशी की मुंब‍ईच्या सुप्रीम कोर्टात निर्णय नारो गोविंदाच्या बाजूनं लागला. त्या निर्णयाविरुद्ध कंपनी सरकारनं लंडनला प्रिव्ही कौन्सिलमध्ये अपील दाखल केलं. ह्या अपीलाचा निर्णय लागेपर्यंत डेक्कन प्रा‍ईझ मनीचं वाटप केलं जा‍ऊ नये अशी पार्लमेंटात मागणी आली आणि त्यानुसार वाटप थांबवून ठेवण्यात आलं. प्रिव्ही कौन्सिलचा हा निर्णय कंपनीच्या अपीलाच्या बाजूनं लागला पण हे होता होता १८३० साल उजाडलं. हा निर्णय वाचायला उपलब्ध आहे.
          'नासक' हिऱ्याचं पुढं काय झालं?
          १६ मार्च १८२१ च्या इंग्लंडच्या वृत्तपत्रांमध्ये नासिक हिरा इंग्लंडला दाखल झाल्याचे वृत्त प्रसिद्ध झाले होते. पण नासिक हिऱ्याचा प्रवास इथेच संपला नव्हता. ३ जुलै १८३७ मध्ये जे. जी. मेसर्स अँड जी. ए. शार्प यांनी या हिऱ्याच्या लिलावाचे आयोजन केले. २० जुलै १८३७ या दिवशी लंडनच्या रुंदेल आणि ब्रिज या जोहोरींनी नासिक हिरा ३०००० पाउंडला विकत घेतला. हा मूळ हिरा ९० कॅरेट म्हणजे १८ ग्राम वजनाचा होता. अक्रोडाच्या आकाराच्या ह्या हिऱ्याचं वजन ८९ कॅरटहून थोडं अधिक होतं. त्याचं तेज वाढविण्याच्या हेतूनं त्याला नंतर दोनदा पैलू पाडण्यात आले.१८३७ मध्ये मिस्टर शार्प यांनी या हिऱ्याला पैलू पडले आणि त्याचे वजन ९० कॅरेटवरून ७८.६२५ कॅरेट झाले.  हिरा मार्क्विस ऑफ वेस्टमिन्स्टरच्या पुढील पिढ्यांच्या ताब्यात पुढची सत्तर‍एक वर्षं होता. 
१९२७ साली हा हिरा न्यूयॉर्क येथील रत्नांचे व्यापारी जॉर्ज मौबुसेन यांना विकण्यात आला. मौबुसेन यांच्याकडे असलेल्या बहुमूल्य हिऱ्याची कुणकुण लवकरच इतरांना लागताच हा हिरा मिळविण्याच्या प्रयत्नात अनेक चोऱ्या घडवून आणण्यात आल्या. १९३० साली हा हिरा चोरण्याचा पुनश्च प्रयत्न झाला, मात्र हा हिरा एका मळक्या, चुरगळलेल्या पाकिटामध्ये लपविलेला असल्याने वाचला. १९३३ साली हा हिरा शिकागो येथे ‘वर्ल्ड फेअर’ मध्ये प्रदर्शित करण्यात आला.
          त्यानंतर २५ मे १८३८ मध्ये  इंग्लंडच्या राजघराण्यातल्या महत्वाची व्यक्ती असलेल्या मार्क्विस ऑफ वेस्टमिनिस्टर रोबेर्ट ग्रॉसव्हेनोर यांनी तो विकत घेतला. त्यांनी तो हिरा आपल्या तलवारीच्या मुठीत बसवला. त्यांच्या मृत्युनंतर न्यूयॉर्कच्या ३३० पार्क अव्हेन्यू वरील श्रीमंत ज्वेलरी, एम. माऊबॉसिन यांनी विकत घेतला.माऊबॉसिन हे मूळचे पॅरिसचे होते. त्यांनी तो आपल्या स्टोअर मध्ये विक्रीला ठेवला. १९४० साली हॅरी विन्स्टन यांनी हा नासिक हिरा विकत घेऊन त्याला पुन्हा पैलू पाडले. या मधल्या काळात हा हिरा चोरीला गेला. पण विन्स्टन यांनी तो पॅरिस मधून पुन्हा मिळवला. १९७० मध्ये हा हिरा पुन्हा लिलावात मांडण्यात आल्याचे वृत्त न्यूयॉर्क टाइम्सने दिले. १६ एप्रिल १९७० रोजी न्यूयॉर्कमधील उद्योगपती एडवर्ड जे हॅन्ड यांनी आपल्या पत्नीसाठी हा हिरा ५,००,००० डॉलरला विकत घेतला. अन जगातला हा सर्वात महागडा हिरा ठरला. त्यांची पत्नी टेनिस स्टार गासी मोरन होती. त्यानंतर हा हिरा अभिनेता रिचर्ड बर्टन, सौदी राजा खालिदबीन यांच्याकडे गेला.
शेवटी २०१६ मध्ये या हिऱ्याचा प्रवास थांबला तो वर्ल्ड हिस्ट्री अर्काइव्ह येथे येऊन दाखल झाला. मराठेशाहीचा असा एक अवशेष एका अमेरिकेतल्या तिजोरीत बंद आहे. काळाचा चमत्कार - दुसरं काय?
      विशेष म्हणजे या हिऱ्याच्या नावाची विमान आकाशात भरारी घेतात. नासिक हिऱ्याच्या प्रेमापोटी मिडलँड एअरवेजने मॅक्डोनेल डग्लसडी जी-९ या विमानाला ‘द नासिक डायमंड’ असं नाव देऊन हिऱ्याच्या आकर्षणावर मोहोर उटवली.
        असं म्हणतात की, हिरा हा उत्कंठा आणि प्रेम याचा अनोखा संगम असतो. तो वारंवार लुटला गेल्याने तो शापित होतो. आणि जो माणूस हा हिरा घेतो त्याच कर्म शापित ठरत. नासिक हिऱ्याच्या बाबतीत असच काहीस घडलं असेल का?








पूवमपुरा􀘩िुग अश्मुशलिन सांस्कृिी :
िारिाि अ􀘩िुगाचा प्रारांि प्रामुख्याने अश्मुशलिन परांपरेने झाला. महाराष्टाि िा परांपरेचे कोकण व सह्याद्यीचा घाटमार्ा सोडला, िर जवळपास सवम नदीकाठच्या तनिेपाांम􀏆े पुरावे आढळले आहेि़. िा आ􀎼 पाषाणिुगािील मानवाच्या जीवनिैलीचा व ित्कालीन पिामवरणाचा अ􀑟ास िेर्े सापडलेल्मा पाषाणाची तवतवध प्रकारची हत्यारे आशण त्याचे िौगोशलक व िूगिमिास्त्यीि िसेच प्राणी व वनस्पिीांच्या जीवा􀘩, इत्यादीांच्या साति􀏆ािून करिा आला आहे. महाराष्टरािील िा आतदमानवाचा िोध डेक्कन कॉलेजचे पुराित्त्वज्ञ तवषिााचे िज्ञप्रा􀏆ापक हसमुख साांकशलिा व त्याांच्या डेक्कन कॉलेजमधील सहकारी डॉ. इराविी कवे व डॉ. झैनुद्दीन अन्सारी आशण िारिीि पुराित्त्व सवेिण खात्याि िेव्हा कािमरि असलेले प्रा􀏆ापक रामचांद्य जोिी िाांच्या सांिोधनामुळे लागला. महाराष्टराि िा िोधमोतहमेचा श्रीगणेिा १९५०च्या दिकाि गोदावरी िीरावर नाशिक-त्र्यांबकेश्वर पररसराि झाला. ही मोहीम गोदावरीकाठी वसलेले स􀏆ाचे नाशिकचा इतिहासपूवम-काळािील सांस्कृिीचा िोध (उत्खनन) घेि असिाांना लागला. नाशिकपासून १० तक. मी. वाि􀒡 तदिेला गांगापूर िेर्े गोदावरी नदीच्या उगमिागाि धरण बाांधण्याचे काम पाहण्याचा िोग आला (जानेवारी १९५१). िेर्ील धरणासाठी खोदकाम करिाांना उजेडाि आलेले छेद िारिािील इिर तठकाणच्या िुलनेि वेगळे तदसून आले. िेर्े नदीचे िळ उर्ळ असून नदीच्या कडाांची उांची फारिी आढळि नाही ; उर्ळ खडकावरून आशण िूपृष्ठानुसार वळण घेि नदी प्रवातहि होिाना तदसिाि. ही वैशिष्ट्ये लिाि घेऊन गांगवाडी िेर्ील सावरगाांवजवळील धरण छेदाांचे परीिण केले असिा िेर्े पुरा􀘩िुगािील हत्यारे आढळली, असे प्रा.साांकशलिा िाांनी तविद केले आहे. (Sankalia 1952:i-ii,1-7; Sankalia and Deo 1955: 1-4, देव १९६२:३३-३४, Sankalia 1978:56, देव २००२:१७-१८; Deo 2013:61-66; 71-73).
अिा अिूिपूवम अकस्माि िोधामुळे (जानेवारी १९५१), िसेच फेबुवारी १९५२ साली गोदावरीच्या उज􀒡ा िीरावर जलालपूर जवळील दगडगोटे व वाळूचा र्र असलेल्मा तनिेपाम􀏆े पाषाणाची हत्यारे सापडल्माने प्रागैतिहासकाळािील सांिोधनाच्या नवा अ􀏆ािाला प्रारांि झाला, सांिोधनाचे नवीन दालन उजेडाि आले. िेर्ील पुरावा स्तरतनबद्ध तमळाल्मामुळे म􀏆पुरा􀘩िुगाच्या सांिोधनासाठी िक्कम पािा उिारला गेला. िसेच िा िोधामुळे महाराष्टराि प्रागैतिहासकाळािील
पोकळी िरून तनघाली, व पिामिाने दख्खनचे पठार अ􀘩िुगीन मानवाला अनुकूल नसल्माचा आशण िेर्ील बेसॉल्ट हा खडक हत्यारे घडतवण्यािोग्य नसल्माचे ित्कालीन मिप्रवाह कालबाह्य ठरले. िा िोधामुळे पुरापिामवरण, िूिास्त्य व पुराित्त्व, इत्यादी तव􀎼ािाखेिील सांिोधनाला महत्त्वपूणम कलाटणी तमळाली; अर्ामिच हे सांिोधन िा तव􀎼ािाखेच्या प्रगिीचे पुढचे पाउल तदिादिमक ठरले. (Sankalia and Deo 1955; Sankalia 1978:56)

 

एक रुपया किंमतीची नाशिक नगरपालिकेची इमारत...

 एक रुपया किंमतीची नाशिक नगरपालिकेची इमारत... 


मेन रोडवरील मनपाची ही वास्तू १९३७ साली बांधण्यात आली होती.  ही इमारत बांधण्याचे कंत्राट काकासाहेब वाघ यांनी घेतले होते. मात्र विविध कारणांमुळे सदर इमारतीचे बांधकाम निर्धारित वेळेत पूर्णत्वास जाऊ शकले नाही. त्यामुळे इमारतीच्या बांधकामासाठी निर्धारित केलेल्या रकमेपेक्षा जास्त रक्कम  तत्कालीन अधिकाऱ्यांनी वेळोवेळी केलेल्या दंडापोटी श्री काकासाहेब वाघ यांना भरावी लागली. या कंत्राटात त्यांना खूपच तोटा झाला. याकारणास्तव त्यांनी कंत्राटापोटी मिळालेल्या रकमेपेक्षा दंडाची रक्कम जास्त होत असल्याने इमारतीच्या बांधकामाचा खर्च १ रुपया इतका नामफलकावर नमूद करावा अशी विनंती केली. ती विनंती मान्य करण्यात येऊन तास उल्लेख नामफलकावर करण्यात आला.  या इमारतीचे संपूर्ण बांधकाम चुनखडीचा वापर करून दगडामध्ये केले आहे. त्यामुळे हि इमारत दगडी इमारत म्हणूनही ओळखली जाते. 
या इमारतीच्या जागेचे भूमिपूजन पाकिस्तानच्या दिवगंत पंतप्रधान बेनझीर भुत्तो यांचे आजोबा शाहनवाझ भुत्तो यांनी १७ ऑक्टोबर १९३४ रोजी केले होते. व त्याप्रसंगी तयार करण्यात आलेल्या संगमरवरी नामफलकावर नगरसेवक भुट्टो यांच्या हस्ते भूमिपूजन करण्यात आल्याचा उल्लेख करण्यात आलेला होता. १९७१ ला पाकिस्तान युद्धा दरम्यान नाशिक नगरपालिकेने महासभेत ठराव पास करून ते नाव काढण्यात आले. .दिंडोरी तालुक्यातील इंदोरीचे शाहनवाझ भुत्तो हे त्याकाळी नाशिकमधील नावाजलेलं प्रस्थ होते. 
कालांतराने कामकाज वाढल्यामुळे सदर इमारत अपुरी पडू लागली व मोठ्या इमारतीची गरज निर्माण झाली. शरणपूर भागात नवीन प्रशस्त इमारत बांधण्यात आली. नाशिक महापालिकेचे मुख्यालय या नवीन इमारतीत स्थलांतरित करण्यात आले. या मनपा मुख्यालयाचे 'राजीव गांधी भवन' असे नामकरण करण्यात आले. मनपाच्या मूळ इमारतीत मनपाचे पूर्व विभागाचे कार्यालय कार्यालय सुरु करण्यात आले. मात्र पुरेशा देखभालीअभावी जीर्ण झाल्यामुळे सदर कार्यालयही २०१९ मध्ये दुसऱ्या ठिकाणी स्थलांतरित  करण्यात आले. 

 भारतातली पहिली महिला वकील “कॉर्नेलिया सोराबजी”

देशाच्या एकूणच जडणघडणीत महिलांचे योगदान आता कोणीच नाकारू शकत नाही. कायदे क्षेत्रातही अनेक महिला वकील आज मानाने व तडफेने काम करताना दिसतात. मात्र, भारतातील पहिल्या महिला वकील म्हणून नाव मिळविलेल्या कार्नेलिया सोराबजी या नाशिकच्या कन्येच्या योगदानाची वा  कायदा क्षेत्रातील लढ्याची कोठेच स्मृती जागवली जाताना दिसत नाही.  आज ६ जुलैला त्यांचा स्मृती दिन. त्यानिमित्त त्यांच्या कार्याचा व संघर्षाचा हा जागर 
देशात महिलांना सुरक्षित वातावरण मिळावे, सर्व क्षेत्रात संधी मिळाव्यात यासाठी विविध कायदे होतांना दिसतात. महिलांना समान संधी आता मिळूही लागल्या आहेत. मात्र, १८ व्या शतकातील उत्तरार्धात भारतातील एका महिलेने कायदा क्षेत्रात महिलांना वकिली करण्याची संधी मिळावी, यासाठी मोठा संघर्ष केला होता. ही महिला होती कॉर्नेलिया सोराबजी. कॉर्नेलिया सोराबजी ( १८६६ ते १९५४) म्हणजे भारतातली पहिली महिला वकील. त्यांनी या पदापर्यंत येण्यासाठी केलेला संघर्ष कष्टप्रद होता. यात त्यांना अनेक अडथळ्यांचा सामना करावा लागला.
कॉर्नेलियाचा जन्म १५ नोव्हेंबर १८६६ मध्ये नाशिकजवळील देवळालीतील पारशी कुटुंबात झाला. कॉर्नेलियाचे बालपण नाशिक, पुणे आणि बेळगावात गेले. त्यांच्या कुटुंबाने १८४१ सालीच ख्रिश्चन धर्माचा स्वीकार केला होता. कॉर्नेलिया हे पाचवे अपत्य. कॉर्नेलियाची आई फासिना यांनी पारशी मुलांसाठी गुजराथी माध्यमाची शाळा, हिंदू मुलांसाठी मराठी तर मुस्लिम मुलांसाठी उर्दू शाळा सुरू केल्या होत्या. 
कॉर्नेलियाने पदवीसाठी पुण्याच्या डेक्कन महाविद्यालयात प्रवेश घेतला. त्या पश्चिम भारतातील पहिल्या महिला पदवीधर ठरल्या. त्या बी. ए. प्रथम वर्गात उत्तीर्ण झाल्या. त्या वर्षी महाविद्यालयातून पहिला वर्ग मिळवणा-या त्या एकमेव विद्यार्थी होत्या. त्यांना इंग्लंडमधील एका विद्यापीठात शिष्यवृत्ती मिळाली. पण महाविद्यालयाने प्रवेश देण्यास नकार दिला. त्या प्रसंगी महाविद्यालयाच्या प्रशासनाने जे उद्गार काढले ते त्या काळाची मानसिकता दाखवतात. It was nonsense for a woman to even think of it... अशा शब्दात कॉर्नेलियाच्या अर्जाची वासलात लावण्यात आली तरी कॉर्नेलियासारखी माणसे डगमगत नाहीत. तिने अनेक प्रयत्न केले आणि ऑक्टोबर १८८९ मध्ये ती ऑक्सफर्डला दाखल झाली. पण महिला आहे या एकमेव कारणावरून तिला प्रवेश नाकारण्यात आला. 
अखेर कॉर्नेलियाच्या मित्राने याबाबत तेथील न्यायालयात महिलांना कायद्याचे शिक्षण घेता यावे, यासाठी १८९२ मध्ये याचिका दाखल केली. याचिकेचा निकाल कॉर्नेलियाच्या बाजूने लागला अन् तिला विशेष परवानगी देण्यात आली. यामुळे तिला ऑक्सफर्ड सोमरविले कॉलेजमध्ये कायदा शिक्षण घेण्यासाठी प्रवेश मिळाला. इंग्लंडमध्ये व ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटीत कायद्याचा अभ्यास करणारी पहिली भारतीय महिला ठरली.   त्यानंतर पदवी प्राप्त करून भारतात परतल्यानानंतरही त्यांचा संघर्ष थांबला नाही. तेव्हा महिलांना वकिली करण्याची परवानगी नव्हती. कायद्यात सुधारणा होऊन वकिली करण्याची परवानगी थेट १९२४ ला मिळाली. व त्यांनी कलकत्ता येथे वकिलीची प्रॅक्टिस सुरु केली. 
१९२९ मध्ये वरिष्ठ वकील म्हणून उच्च न्यायालयातून निवृत्त झाल्यानंतर त्या लंडन येथे स्थायिक झाल्या. निवृत्तीच्या काळात त्यांनी महिलांविषयक समाजसुधारणेच्या कार्यास वाहून घेतले. त्यांनी लिहिलेली लव अॅण्ड लाइफ बियाँड द पर्दा’ (१९०१), सन-बेबीज : स्टडीज इन द चाइल्ड-लाइफ ऑफ इंडिया (१९०४), बिटवीन द ट्विलाइट्स: बीइंग स्टडीज ऑफ इंडिया वूमन बाय वन देमसेल्व्ह्स (१९०८), इंडियन टेल्स ऑफ द ग्रेट वन्स अमंग मेन, वूमन अँड बर्ड पीपल (१९१६), सोराबजींनी इंडिया कॉलिंग : द मेमरीज ऑफ कॉर्नेलिया सोराबजी (१९३४), इंडिया रिकॉल (१९३६), क्वीन मेरीज बुक फॉर इंडिया (१९४३) हि पुस्तके जगभर गाजली. सामाजिक सुधारणा कायदेविषयक कामाव्यतिरिक्त त्यांनी अनेक पुस्तके, लघुकथा आणि लेखही लिहिले. ६ जुलै १९५४ ला वयाच्या ८८ व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. त्यांनी नाशिकसह राज्याचे नाव इतिहासात कोरले आहे. 

 नाशिक ट्राम

नाशिकमध्ये १८८९ मध्ये ब्रिटिश राजवटीत ट्राम सेवा सुरू झाली. कोलकाता आणि मुंबईनंतर ट्राम मिळवणारे नाशिक हे भारतातील तिसरे शहर होते. नाशिक येथील ट्राम नॅरोगेज म्हणून बांधण्यात आल्या होत्या. या सेवेचे वैशिष्ट्य म्हणजे ती इंजिनने चालविली जात नव्हती तर घोड्यांद्वारे चालविली जात होती. दोन केबिन चार घोडे ओढत असत. जवळपास २७ वर्षे नाशिकच्या मार्गांवर ते धावले आणि नंतर घोड्यांची जागा पेट्रोल इंजिनने घेतली.तब्बल ४४ वर्षे नाशिकच्या जनतेची सेवा केली. जिचा मार्ग मेनरोडवरील (जुनी महानगरपालिका) ते नाशिकरोड असा होता.

इसवी सन  १८१८ मध्ये नाशिक ब्रिटिश सत्तेच्या अंमलाखाली आले. तेव्हा नाशिक हे तीर्थक्षेत्र व धार्मिक ठिकाण म्हणूनच प्रसिद्ध होते. ब्रिटिशांनी नाशिकला शहराचा दर्जा देऊन इसवी सन १८६५ मध्ये नगरपालिकेची स्थापना केली. या दरम्यानच्या काळात मुंबई व ठाणे दरम्यान १८५३ला रेल्वेसेवा सुरु झाली होती. मुंबईपासून जवळ असलेल्या नाशिकजवळील देवळाली येथे इसवी सन १८६१ मध्ये ब्रिटिश लष्कराची छावणी उभारण्यात आली. लष्कराच्या जलद हालचालीसाठी रेल्वेमार्गाची आवश्यकता होती. त्यामुळे मुंबई व नाशिक मार्गावरील थळघाटात रेल्वेमार्ग टाकण्याचे काम हाती घेण्यात आले. १८६५ मध्ये थळ घाट ( म्हणजे आताचा कसारा घाट) रेल्वे मार्ग पूर्ण झाला. याच वर्षी देवळाली मार्गे नाशिक येथेही रेल्वे स्टेशन सुरु करण्यात आले. मात्र हे रेल्वे स्टेशन झाल्यास परदेशी नागरिकांचा वावर नाशिकमध्ये वाढून ब्रिटिश आपल्या धार्मिक रूढी व परंपरा यात दखल देतील या भीतीने तत्कालीन धर्मपंडितांनी नाशिकला रेल्वे स्टेशन बांधण्यास विरोध केला. त्यामुळे हे रेल्वे स्टेशन नाशिक शहरापासून १० किमी दूर शहराबाहेर  उभारण्यात आले व या स्टेशनला नाशिकरोड हे नाव देण्यात आले.  त्याकाळी नाशिक व नाशिकरोड दरम्यान घनदाट अरण्य होते. लूटमार व वन्य प्राण्यांची भीती यामुळे नाशिकहून नाशिकरोड रेल्वे स्टेशनवर जाणे सर्वसामान्यांसाठी अवघड होते. त्यामुळे नाशिक ते नाशिकरोड या मार्गावर सार्वजनिक वाहतुकीसाठी साधनांची आवश्यकता निर्माण झाली.

दि ग्रेट इंडियन पेनिन्सुला रेल्वे कंपनीतील ब्रिटिश अभियंता एव्हरार्ड रिचर्ड कॅलथ्रॉप याचा नॅरो गेज लोहमार्ग उभारण्यात हातखंडा होता. त्याने स्थानिक सार्वजनिक वाहतुकीसाठी नॅरोगेज रेल्वेचा प्रभावी वापर करता येईल असा विचार केला व त्यानुसार नाशिक ते नाशिकरोड रेल्वे स्टेशन जोडणारा ५ मैल लांबीचा नॅरोगेज ट्रामवे व सोलापूर जिल्ह्यातील बार्शी येथे रेल्वे स्टेशन ते बार्शी गाव असा २१ मैल लांबीचा नॅरोगेज मार्ग असे दोन प्रकल्प कंपनींकडे सादर केले.

दि ग्रेट इंडियन पेनिन्सुला रेल्वे कंपनीने दोन्ही प्रकल्पांना मंजुरी दिली व कॅलथ्रॉप यांनी या मार्गांचे सर्वेक्षण हाती घेतले. इसवीसन १८८७ मध्ये त्यांनी लंडनला दि इंडियन रेल्वेस फीडर लाईन्स कंपनीची नोंदणी केली. १८८९मध्ये आरोग्याच्या कारणास्तव कॅलथ्रॉप यांनी दि ग्रेट इंडियन पेनिन्सुला रेल्वे कंपनीतून सेवेचा राजीनामा दिला. मात्र नाशिक ट्रामच्या बांधणीच्या कामावर सल्लागार म्हणून देखरेख केली.

इसवी सन १८८९मध्ये नाशिक ट्रामच्या  बांधणीस एक लाख रुपये खर्च आला होता. चार घोड्यांच्या साहाय्याने ओढली जाणारी दोन डब्यांची गाडी असे नाशिक ट्रामचे  सुरुवातीचे स्वरूप होते. ही ट्राम गाडी मेनरोडवरील नाशिक पालिकेच्या इमारतीपासून निघून नाशिकरोड रेल्वे स्टेशन पर्यंत जात असे. नाशिक ट्रामचा प्रवास मार्ग मेन रोड - भद्रकाली - गंजमाळ - सध्याच्या फेम मल्टिप्लेक्सच्या मागून - नाशिकरोड रेल्वे स्टेशन असा ९-१० किमीचा होता. ब्रॅडी'ज या खाजगी कंपनीने या प्रकल्पाला वित्तपुरवठा केला होता. याच कंपनीने नंतर नासिक ट्रामवे कंपनी या नावाखाली भारतातील पहिली पेट्रोल इंजिनवर चालणारी ट्राम सुरु केली. दरम्यान सलग पडलेले दुष्काळ, प्लेग इ. रोगांच्या साथी यांमुळे झालेल्या प्रचंड तोट्यामुळे या ट्राम सेवेला घरघर लागली होती. अखेर सन १९३३ मध्ये नाशिक ट्राम कंपनीने बंद केली. 

(छायाचित्रे आंतरजालाच्या मदतीने)

- अशोक दारके

 
 
 

नासिक कि नाशिक

नासिक कि नाशिक?

प्रत्येक गावाला किंवा शहराला त्याचा एक इतिहास असतो तसेच त्या गावाला किंवा शहराला त्याचे मूळ नाव देखील असते. 'नासिक शहर' देखील असेच प्राचीन आहे. मुळात सध्या सगळे लोकं 'नासिक' या शहराच्या नावाचा उल्लेख हा 'नाशिक' असा करतात परंतु या शहराचे मूळ नाव 'नासिक' असेच आहे.

दक्षिणेकडची गंगा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या 'गोदावरी नदीचा' उगम हा त्र्यंबक गावाला लागून असलेल्या 'ब्रम्हगिरी' पर्वतावर होतो. 'नासिक' शहरात शिरताना गोदावरी नदीचे पात्र फार विस्तारलेले दिसते. मुळात 'नासिक' शहर हे भारतातील महत्वाच्या तीर्थक्षेत्रांंपैकी एक महत्वाचे तीर्थक्षेत्र आहे.

प्राचीन काळामध्ये 'नासिक' शहराचे उल्लेख हे नासिक्य, जनस्थान, त्रिकंटक, तसेच पद्मनगर असे देखील आढळून येतात. रामायणामध्ये आलेल्या उल्लेखानुसार दंडकाराण्यातील 'जनस्थान' म्हणजेच 'नासिक'.  'नासिक' मधील 'पंचवटी' म्हणजे पाच ऋषीकुमारांचे प्रतिक असून हे शापित ऋषिकुमार प्रभू रामांच्या पावनस्पर्शाने मुक्त झाल्याचे मानतात अशी एक कथा आहे. राम, लक्ष्मण, सीता गोदावरीच्या तीरावर जनस्थानामध्ये पंचवटी येथे पर्णकुटी बांधून राहिले होते ते ठिकाण म्हणजेच 'नासिक'.
        
रामाशी विवाह करण्याची अभिलाषा धरून आलेल्या शुर्पणखेचे कान आणि नासिका म्हणजे नाक, लक्ष्मणाने तलवारीने छाटून टाकले ते इथेच. म्हणून या स्थानाला 'नासिक' म्हणू लागले. अशी एक उपपत्ती आपल्याला पाहायला मिळते. दुसरी उपपत्ती जी आहे ती अशी  गोदावरीच्या तीरावरील नऊ टेकड्यांवर हे गाव वसले म्हणून ते 'नवशिख' पुढे त्याचा अपभ्रंश 'नाशिक' या नऊ टेकड्या आपल्याला नासिक शहरात आजही पाहायला मिळतात. १) जुनी गढी २) नवी गढी ३) जोगवाडा टेक ४) पठाणपुरा टेक ५) म्हसरूळ टेक ६) डिंगरआळी टेक ७) सोनार अळी टेक ८) गणपती डोंगर ९) चित्रघंटा टेक.

कृतेत पद्मनगरं त्रेतयांंतू त्रिकंटकं |
द्वापारातु जनस्थान कलौ नासिक मुच्यते |

हा श्लोक पद्मपुराणातील असून प्रत्येक युगातील नासिकच्या नावाची माहिती आपल्याला यामध्ये मिळते. म्हणजेच पद्मपुराण जेव्हा लिहिले गेले त्याच्यापूर्वीपासूनच 'नासिक' हा उल्लेख सापडतो. कारण अजून एक पद्मपुरणात जो उल्लेख सापडतो तो असा:-

कशी पुरी च केदारी महाकलोथ नासिकम् |
त्र्यंबकं च महाक्षेत्रंं पंचदीपा इमे भुवि |    

'नासिक' शहराचा जो प्राचीन इतिहास उपलब्ध आहे त्यामध्ये इ.स. पूर्व २ ऱ्या शतकाच्या सुरुवातीस महाराष्ट्रात 'सातवाहनांची' सत्ता उदयास आली त्याच्याही आधी 'नासिक' हे शहर संपूर्ण भारतात माहिती होते. इ.स. पूर्व ५ व्या / ४ थ्या शतकात निर्माण झालेल्या वाड्.मयातून नासिकचा उल्लेख हा 'नासिक्य' असा आलेला आहे. कौटिल्याने देखील 'नासिकचा' उल्लेख हा 'नासिक्य' केलेला आहे. कात्यायनाच्या 'वृत्तीकांत' या ग्रंथात इ.स.पूर्व २५०   मध्ये 'नासिक्य' हाच येतो.

नासिक आणि बौद्धधर्म यांचा संबंध हा प्राचीन काळापासून आपल्याला दिसून येतो. 'महामायुरी' या महत्वाच्या ग्रंथात 'नासिक' येथे सुंदरयक्ष असल्याचा उल्लेख आपल्याला मिळतो. याच कालखंडामध्ये नासिक येथे संपूर्ण नासिक मध्ये प्रसिद्ध असलेली 'त्रिरष्मी लेणी' जिला लोकं पांडव लेणी संबोधतात त्या कोरल्या गेल्या. इ.स. १५० मध्ये प्रसिद्ध खगोलतत्ववेत्ता टाॅलेमी याने 'नासिक' शहराची नोंद हि 'धर्मपीठ' म्हणून केलेली आहे.  

पतंजली याच्या महाभाष्य या ग्रंथात 'नासिकचा' उल्लेख येतो. जैन परंपरेनुसार जैनांचे आठवे तीर्थंकर 'चंद्रप्रभ' यांनी 'नासिक' येथे कुंतीविहार नावाचे मंदिर  बांधले. हि नोंद इ.स. १४ व्या शतकातील 'जीनप्रभूसूरींच्या' 'विविधतीर्थकल्प' या ग्रंथामध्ये मिळते.

महानुभाव पंथाचे संस्थापक 'चक्रधर स्वामी' 'नासिक' मध्ये काही काळ फिरल्याचे संदर्भ हे यांच्या 'स्थानपोथी' या महत्वाच्या ग्रंथात मिळतात. स्वत: चक्रधर स्वामी हे नासिक येथे पंचवटी येथे वास्तव्यास होते. या काळात त्यांनी रामनाथ, महालक्ष्मी, विनायक आदित्य, कपालेश्वर, या ठिकाणी भेटी दिल्या असे उल्लेख आहेत. नंतर ते गोवर्धन, त्र्यंबक, अंजनेरी, या ठिकाणी गेले आणि परत 'नासिक' येथे आले आणि 'नासिक' मधून बीड येथे ते निघाले असे उल्लेख आपल्याला मिळतात.

इ.स, १३४७ पर्यंत 'नासिक' यादवांच्या अधिपत्याखाली होते. त्यानंतर इ.स. १४९० सालापर्यंत येथे 'बहामनी' सत्तेने निर्विवाद वर्चस्व राखले. तेव्हा देखील उल्लेख 'नासिक' असाच सापडतो. इ.स. १४९० सालानंतर बहामनी सत्तेची शकले उडाली त्यानंतर 'नासिक' हे शहर 'अहमदनगरच्या निजामशहा' याच्या ताब्यात इ.स. १६३६ पर्यंत होते. इ.स. १६४४ मध्ये 'समर्थ रामदास स्वामी' पंचवटी येथील रामउपासकाला लिहिलेल्या पत्रामध्ये नासिकचा उल्लेख हा 'जनस्थान' असा करतात तो श्लोक पुढीलप्रमाणे:-

जनस्थान गोदातटी | परमपावन पंचवटी ||
येथे घडली कृपादृष्टी | रघुत्तमरायाची ||

शिवाजी महाराजांच्या काळात देखील 'नासिक' हे दिसून येते. दक्षिणेची काशी असलेल्या 'नासिक' शहराचे नाव मोगल बादशहा औरंगजेब याने 'गुलशनाबाद' असे केले. इ.स. १७६० ते १८१८ पर्यंत येथे मराठ्यांच्या राज्यात आपल्याला 'नासिक' हाच मूळ उल्लेख मिळतो. इ.स. १८१८ नंतर 'नासिक' शहरावर इंग्रजांचा अंमल सुरु झाला तेव्हा देखील 'नासिक' हाच उल्लेख आपल्याला मिळतो.

इ.स. १८७० साली इंग्रजांनी 'नासिक' शहराला जिल्ह्याचा दर्जा दिला आणि जे गॅॅझेटीयर काढले त्याचे नाव देखील 'बॉम्बे प्रेसिडेंसी नासिक डिस्ट्रीक्ट गॅॅझेटीयर' असे ठेवले. एकंदरीत सगळे उल्लेख संदर्भ पहिले तर मूळ नाव हे 'नाशिक' असे नसून 'नासिक' आहे हे सिद्ध होते.

संदर्भग्रंथ:-

१) नासिक दर्शन:- पुरातत्व व वास्तूसंग्रहालये विभाग, महाराष्ट्र शासन.
२) इतिहास खंड १:- आधुनिक महाराष्ट्राची जडणघडण:- संपादक डॉ. रा.श्री.मोरवंचीकर.
३) तपोभूमी नाशिक:- रमेश पडवळ
४) Bombay Presidency Nasik District Gazeteer:- 1883.
5) भारताचे संस्कृतीवैभव:- डॉ. शोभना गोखले
६) नासिक जिल्ह्याचे वर्णन:- दामोदर गणेश भालेराव आणि विठ्ठल खंडेराव क्षीरसागर, १९२४
७) सातवाहन नृपती आणि पश्चिमी क्षत्रप यांचा इतिहास आणि कोरीव लेख.:- वा. वि. मिराशी, १९७९
८) Cave Temples of India:- James Burgess and James Ferguson, 1870
९) दक्षिण काशी पैठण:- रा.श्री. मोरवंचीकर, १९८५
१०) महाराष्ट्र ज्ञानकोष:- श्री. व्यं. केतकर, १९२५
११) नाशिक दर्शन:- भारतीय इतिहास संकलन समिती, १९९१
१२) स्थानपोथी: एक पुरातत्वीय अभ्यास:- डॉ अरुणचंद्र पाठक

- अनुराग वैद्य

आज नाशिक ला 155 वर्ष पूर्ण झाले
आज नाशिक चा वाढदिवस आहे
नासिक कलेक्टरेट आणि नासिक जिल्ह्याला २६ ऑक्टोबर रोजी १५५ वर्ष पूर्ण होत असल्याबद्दल सर्व नाशिककरांचे सर्व प्रथम हार्दिक अभिनंदन करतो 💐
नासिक हे मौर्य, सातवाहन, यादव, मोगल, मराठे ,निजाम आणि उत्तर मराठीशाहीतील पेशवे यांच्या कारकिर्दी मधील एक महत्त्वाचे शहर म्हणून नेहमीच गणले जात असे. नाशिक म्हणजे नाशक आणि खानदेशाला आशक असे हे नाव असल्याचे दिसून येते. प्रचंड मोठ्या डोंगराळ भाग आणि लांबवर पसरलेल्या कुरणांमुळे इतिहासामध्ये मोठमोठ्या लढाया या भागात झाल्याचे दिसून येते.
सुंदर वातावरणामुळे मोगलांनी याचे नाव गुलशनाबाद ठेवले होते.
१७५१ मधील भालकीच्या तहामधे नाशिक निजामाने मराठ्यांना द्यायचे ठरले होते मात्र ते हातात येत नव्हते, मधल्या काळात नानासाहेब पेशव्यांने चातुर्याने निजामाकडून नाशिकचा ताबा मिळवला. नाशिक ही पेशव्यांची उपराजधानी होती तर त्र्यंबकेश्वर चा किल्ला हे प्रमुख संरक्षक ठाणे होते. नासिकला नाशिक हे नाव या काळातच मिळाले.
ज्याच्या ताब्यात त्रंबकेश्वरचा किल्ला तो नाशिकचा मालक असा काहीसा समज त्या काळात होता. दुसरा बाजीराव पळपुटा हा पुण्याजवळील खडकीचे युद्ध हरल्यानंतर अठराशे अठरा साली इंग्रजांनी विना प्रतिकार नाशिक शहर जिंकून घेतले. कारण पेशव्यांचे सशस्त्र सैनिक हे सर्व त्र्यंबकेश्वरला आराम करण्यासाठी गेले होते.
इंग्रजांनी शहर ताब्यात घेतल्या वरती आपल्या पद्धतीने शहरात सुधारणा करण्यास सुरुवात केली.
जुन्या काळी नाशिक हे पंचवटी , सध्याचा मेन रोड पुरतेच मर्यादित होते . एक गलिच्छ, घाणेरडे, धार्मिक ठिकाण जेथे वारंवार साथीचे व रोग येत असत असा नाशिकचा नावलौकिक होता व तो मिटवायचा इंग्रजांनी बराच प्रयत्न केल्याचे दिसून येते. चांगल्या हवामानामुळे इंग्रजांनी नाशिकला देशाची राजधानी बनवायचा हे प्रयत्न केला मात्र तो सफल न झाल्याने तोफखाना केंद्र ,गोल्फ क्लब, डिस्टिलरी, नोट प्रेस इत्यादी महत्त्वाचे सरकारी उपक्रम नाशिकला आणायचा सफलता पूर्ण प्रयास केल्याचे दिसून येते.
तर माझ्याकडे उपलब्ध कागदपत्रांनुसार १८४२ बेल यांनी श्री आर डी लॉर्ड यांच्याकडून उपजिल्हाधिकारी या पदाचा ताब्यात असल्याचे दिसून येते तर १८४३साली श्री टेलर अहमदनगर जिल्हाधिकारी यांचे दुय्यम सहाय्यक आणि न्यायाधीश होते त्यांची वणी- दिंडोरी तालुक्याला उपजिल्हाधिकारी म्हणजेच सब कलेक्टर म्हणून बदली झाल्याचे आणि नाशिक तालुक्यावरून कार्यमुक्त केल्याची नोंद आढळते.
१८५५ साली नाशिक शहरातून महु पर्यंत टेलिग्राफ म्हणजेच तारेची लाईन गेल्याचे दिसून येते, तर पुढील काही वर्षांमध्येच सातपुड्यापर्यंत जी रेल्वे लाईन टाकली गेली यामध्येही नाशिक वरून रेल्वे जाईल अशी व्यवस्था करण्यात आल्याचे दिसून येते.
त्र्यंबकेश्वर आणि इगतपुरी या नगपालिकां नंतर १८६५ साली नाशिक म्युनिसिपालिटी म्हणजे नगर पालिका झाल्याचे दिसून येते. यामध्ये माझ्याकडे उपलब्ध कागदपत्रांनुसार श्री हॅवलोक यांचे आदेशाद्वारे ६ ऑगस्ट १८६५ रोजी श्री करशेटजी नुसर्वाणजी हे नासिक म्युनिसिपल कमिशनर झाल्याचे दिसते ,मात्र आश्चर्याची गोष्ट अशी की ते नाशिक शहराचे पोलीस इन्स्पेक्टर ही होते.
पण या आधी नासिक पेक्षाही अहमदनगर जिथे इंग्रजांचा महत्त्वाचा सैनिकीतळ होता तेथून नासिकचे कामकाज बघितले जायचे. थोडक्यात सांगायचे तर अहमदनगर हे जिल्ह्याचे प्रमुख ठिकाण होते तर नासिक हा तालुका होता .
नासिक चा एकंदरीत पसारा वाढत असतानाच अहमदनगर वरून सर्व कार्यभार सांभाळणे अवघड जात असल्याने तत्कालीन मुंबई प्रांतामध्ये झालेल्या बैठकीनुसार दिनांक १० जुलै १८७९रोजी भडोच ,कुलाबा, सोलापूर सोबतच नासिक हे स्वतंत्र कलेक्टरेट म्हणजे जिल्हा झाल्याचे जाहीर करण्यात आले , मात्र नाशिक कलेक्टरेट हे न्यायालयीन कक्षा ठाणे (Thane) याच्याशी संलग्न असल्याचे दिसते. तर याच नोटिफिकेशन नुसार अकोला तालुका हा न्यायालयीन कामासाठी सिन्नरला जोडल्याचे व सिन्नर हे ठाणे न्यायक्षेत्राच्या अंतर्गत असल्याचे नमूद करण्यात आलेले आहे.
श्री आर सी ओवेन्स हे नाशिकचे पहिले जिल्हाधिकारी होते तर माझ्याकडे उपलब्ध कागदपत्रांनुसार श्री ए एच प्लंकेट, हुजूर डेप्युटी कलेक्टर यांनी २८ सप्टेंबर १८६९ रोजी नाशिकचा कार्यभार सांभाळल्याचे दिसते.
लेफ्टनंट डब्ल्यू सी ब्लॅक हे सुपरन्युमरी असिस्टंट सुपरीटेंडंट नासिक रिव्हिजन सर्वे या पदावर दिनांक १८ नोव्हेंबर १८६९रोजी नियुक्त झाल्याचे दिसते
यानंतर २६ जुलै १८६९ च्या शासन आदेशानुसार अहमदनगर आणि खानदेश जिल्ह्यांमधील काही तालुके नवीन झालेल्या नाशिक जिल्ह्यासाठी वर्ग करण्यात आले ते खालील प्रमाणे:- नासिक, सिन्नर, इगतपुरा , दिंडोरी, चांदोर ,निफाड, सावरगाव, अकोला आणि पेठ हे अहमदनगर मधील तालुके नाशिक तालुक्याला जोडण्यात आले. तर मालेगाव ,नांदगाव आणि बागलाण हे खानदेश मधील तालुके नाशिक कडे वळवण्यात आले.
एक लक्षात घ्या की पूर्वी त्रंबकेश्वर तालुका नव्हता,१९९६ मधे इगतपुरी आणि नाशिक तालुक्यातील काही भाग एकत्र करून त्रंबकेश्वर तालुका बनवण्यात आला. येवला इंग्रज काळात कधीतरी नंतर जोडण्यात आला , तर सावरगाव (गंगापूर धरणा जवळील जमिनीच्या गैरव्यवहारांसाठी प्रसिद्ध असलेले ) हे महत्त्वाचे गाव असल्याने त्याला पहिले तालुका बनवण्यात आले होते मात्र नंतर त्याचा तालुक्याचा हुद्दा काढून घेण्यात आला. बरीच वर्ष सांभाळ केल्यानंतर अकोला तालुका परत नगर जिल्ह्यास जोडण्यात आला. सुरगाणा हे राजे पवार देशमुख यांचे स्वतंत्र संस्थांनं होते जे १९४७ मध्ये भारताला स्वातंत्र्य मिळाल्यावर नाशिकचा एक तालुका म्हणून जोडले गेले
तत्कालीन कागदपत्रांनुसार नाशिकचे स्पेलिंग हे Nassick असे लिहिले जात असे प्रत्येक इंग्रज अधिकारी आपल्या उच्चारानुसार व सोयीनुसार लोकांची आणि गावांची नावे लिहीत असत यामुळे फार गोंधळ उडत असल्याने २० मार्च १८७९ रोजी मुंबई प्रांतातील सर्व गावांची नावे ही आदेश जारी करून नक्की करण्यात आली व यामध्ये Nassick हे Nasik झाले.
अशा पद्धतीने २६ ऑक्टोबर १८६९ च्या शासन आदेशानुसार नाशिक जिल्ह्याच्या स्थापनेचा श्री गणेशा झाला.नाशिक १५५ वर्षाचं झाले आहे...
धार्मिक , सामाजिक , शैक्षणिक व राजकीय क्षेत्रात आघाडीवर असणारा नाशिक जिल्हा वर्धापन दिन चिरायु होवो समस्त नाशिककरांना जिल्हा वासियांना हार्दिक शुभेच्छा

 
mahamtb.com

गोदा संस्कृतीच्या महावस्त्रातील बहुमूल्य दस्तऐवज ’गौतमी माहात्म्य’

23-Mar-2024    मृगा वर्तक

Goda Culture Gautami Mahatmya

‘गौतमी माहात्म्य व तिच्या अष्टांग स्थानांचा सांस्कृतिक अभ्यास’ हा तीन खंडातील ग्रंथ ‘महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृती मंडळा’ने प्रकाशित केला आहे. या तीनही ग्रंथांचे संपादन डॉ. अरूणचंद्र शं. पाठक यांनी केले आहे. दै. ‘मुंबई तरुण भारत’ला विशेष दिलेल्या मुलाखतीत पाठक यांनी याबाबत सविस्तर माहिती दिली. मुलाखतीतील या माहितीचा लेखस्वरुपात घेतलेला आढावा...

गोदाखोरे एक स्वयंपूर्ण परिसंस्था. या दक्षिण द्वीपकल्पीय, पश्चिम घाटोद्भव आणि पूर्ववाहिनी नदीला ‘वृद्धगंगा’ व ‘दक्षिणगंगा’ म्हणून ओळखतात. मध्य भारताला दक्षिण भारताशी जोडणारी अशी गोदावरीच्या खोर्‍याची ओळख. संपूर्ण महाराष्ट्र, तेलंगण व आंध्र प्रदेशातून प्रवाहित होणार्‍या गोदावरी नदीचे खोरे मध्य प्रदेश, छत्तीसगढ, ओडिशा व कर्नाटकच्या सीमांना स्पर्श करते. प्रामुख्याने मान्सूनचे अपत्य असलेली गोदावरी नदी मान्सूननंतर काही काळाने खंडित होते.

प्रवाहात तिला प्रवरा, ढोरा, सिंदफणा, सरस्वती, मांजरा या व इतर एकूण ३३ उपनद्या मिळतात, तर तिच्या डाव्या बाजूकडून अगस्ती, शिवभद्रा, येलभद्रा, पूर्णा, प्राणहिता, इंद्रावती अशा एकूण ३५ उपनद्या मिळतात. गौतमी माहात्म्य व तिच्या अष्टांग स्थानांचा सांस्कृतिक अभ्यास या बृहत् प्रकल्पात गोदावरी नदीच्या खोर्‍याचा अभ्यास करताना, तो तिच्या विविध अंगांनी केला आहे. या पुस्तकात गोदावरीचे भौगोलिक व भूशास्त्रीय दृष्टिकोनातून तपशील दिले आहेत. शिवाय तिच्या भूपुरातत्त्वीय स्वरुपातील प्राचीन पर्यावरणाचा तपशील नोंदवला आहे.

गौतमी माहात्म्य (भाग १)

ब्रह्मपुराणांतर्गत असलेल्या गौतमी माहात्म्याच्या विविध प्रतींचे अवलोकन व संकलन करण्याचा प्रयत्न पहिल्या भागात दिसून येतो. त्याजोडीने पद्मपुराण, स्कंदपुराण, मत्स्यपुराण यांसारख्या पुराणग्रंथांतूनही गौतमी माहात्म्याची नोंद सापडते. प्रस्तुत प्रकल्पात रंगनाथशास्त्री वैद्य यांची प्रत प्रमाण मानून, तिचा अनुवाद उपलब्ध करून दिला आहे. या प्रतीत एकूण १०५ अध्याय असून एकूण श्लोकसंख्या ४ हजार, ६४० इतकी आहे. ’गाथासप्तशती’मध्ये गोदेला ‘गोला’, ‘गोलाई’, ‘गोलवई’ या नावांनी संबोधले आहे. गोदावरीचे नाव ‘गोदा’ या द्रविड शब्दापासून निर्माण झाले, तर दख्खनला विभागणारी म्हणून ‘गोंदे’ (मर्यादा) या तेलुगू शब्दापासून तिला हे नाव पडल्याचे, काही भाषा पंडित मानतात.

गोदावरीकाठी असलेल्या विविध जनसमूहांमध्ये भिल्ल, कोळी, वारली, कोकणा, ठाकूर, कोलम, पारधी, कोया, तसेच आंध्र-तेलंगणमध्ये कोंडारेड्डी, चेन्च्यू, थोट्टी, कोलाम, गौंड तर तिच्या त्रिभुज प्रदेशात कोंडारेड्डी, पांडवरेड्डी, राजरेड्डी आपले अस्तित्व टिकवून आहेत. विविध जमाती आपली अंगभूत वैशिष्ट्ये टिकवून राहिल्या आहेत. तिच्या विविध उपनद्यासुद्धा आपापल्या खोर्‍याचे सहअस्तित्व स्पष्ट करतात. गोदावरीच्या समन्वयात्मक स्वरुपातून आपल्याला विविधतेतील एकात्मता दिसते. पौराणिक साहित्य व स्थल माहात्म्यातून व्यक्त होताना ही कथानके, भारतीय परंपरेच्या अखंडित प्रवाहाचे सातत्य दाखवतात. अगदी वेदकाळापासूनचे संचित जनसामान्यांपर्यंत पोहोचवताना काही कथानके रुपात्मक परिवर्तनासह व्यक्त होतात.

’अष्टांगांचा अभ्यास’ (भाग २)

संत दासगणू महाराजांनी गोदावरीची पूर्ण प्रदक्षिणा करून, गौतमी माहात्म्याच्या उपलब्ध असलेल्या विविध प्रती, परंपरेने रूढ असलेल्या लोकस्मृती, विविध स्थानांवरील श्रद्धा व परंपरा यांच्या आधारे गोदावरीच्या अष्टांगांची नोंद केली. गोदावरी नदीची मानवी शरीराशी तुलना करून, विविध स्थाने निश्चित केली. त्याविषयीचा उल्लेख असा की,

शिरप्रदक्षिणा ब्रह्मगिरी, मुखप्रदक्षिणा पुणतांबेनगरी। कंठप्रदक्षिणा होय पुरी, पैठणक्षेत्राजवळी हो

मंजरथ हृदयस्थान, शंखतीर्थ नाभी जाण। कटी होय मंथन, जानु ती धर्मापुरी

त्र्यंबकेश्वर शीर्षस्थान मानले गेले आहे. येथे ब्रह्मगिरीवर गोदावरीचा उगम होतो. संस्कृतमधील एक कोश ’कल्पद्रुम’ यात जल अथवा स्वर्ग प्रदान करण्यामध्ये जी श्रेष्ठ आहे, तिला ‘गोदावरी’ म्हटले आहे. एकूण संपन्न जीवनासाठी आवश्यक जल प्रदान करणारी, गोदावरी नदी मानली गेली आहे. तिच्यावर असलेल्या आत्यंतिक निष्ठेमुळे काळाच्या ओघात आलेल्या विविध नैसर्गिक व मानवी आपत्तींना तोंड देऊन सांस्कृतिक जीवनाचे सातत्य कमी-अधिक प्रमाणात टिकून आहे.

नाशिक येथे वैष्णव व शैव परंपरा आहेत. नाशिक येथे असलेली सातवाहनकाळातील बौद्धलेणी तेथील स्थापत्य व शिलालेखांसाठी प्रसिद्ध आहेत. येथील बौद्ध लेण्यांमध्ये सातवाहन राजा कृष्ण, गौतमीपुत्र सातकर्णी, यज्ञ सातकर्णी, वसिष्ठी पुत्र पुलूमावी या राजांचे दानलेख उपलब्ध आहेत. उत्तर काळातील जैन लेणी व मंदिर स्थापत्य नाशिक-अंजनेरी क्षेत्रात आढळून येते. प्राचीन यज्ञपरंपरा व पेशवेकालीन घाट हे या स्थानाचे वेगळेपण आहे.

प्रतिष्ठान (पैठण) हे गोदावरीचे कंठस्थान, गोदावरीच्या अर्धचंद्राकृती वळणावर वसलेले पैठण सातवाहन राजवंशाचे प्रमुख केंद्र होते. नाशिकप्रमाणेच मानवी वसाहतीचे आद्यकेंद्र म्हणून याची नोंद केली जाते. प्रतिष्ठानचा दबदबा संपूर्ण भारतात व भारताबाहेरही होता. गौतमीपुत्र सातकर्णी ते बदामी चालुक्य, कल्याणी चालुक्य, राष्ट्रकूट, यादव आणि उत्तरकाळातील सर्वच राजांनी गोदावरी खोर्‍यात सत्तेसाठी संघर्ष केल्याचे आढळून येते. प्रतिष्ठान येथे राजसत्तेच्या बरोबरच धर्मसत्ता देखील होती. चक्रधर, ज्ञानेश्वर व पुढे उत्तर काळातील एकनाथ महाराज, शिवदिन केसरी, कृष्ण दयार्णव अशा संतकवींची नोंद घेऊन, त्यांचा सखोल अभ्यास डॉ. रा. मोरवंचीकर यांनी केला आहे. त्याच्याच आधारे या स्थानांची नोंद केली आहे. मंजरथ हे गोदावरीचे हृदयस्थान मानले जाते. येथे तिला सिंदफणा नदी काटकोनात मिळते.

एफ. इ. पर्जिटरच्या मते, ‘हनुमान’ या नावाची व्युत्पत्ती तामिळमध्ये ‘अणुमंती’ म्हणजे ‘नरवानर’ अशी दाखवली आहे. ऋग्वेदातील सूक्तात ‘वृषकपी’ असे नाव आले आहे. सामान्यजनांनी तामिळ नावाचे संस्कृतीकरण ‘हनुमान’ असे केले. वृषकपी, क्षणुक्षेप व अशा अन्य काही कथा गौतमी माहात्म्यात येतात. याचे काही संदर्भ वैदिक व उपनिषदिक साहित्यात आलेले दिसतात.

शंखतीर्थ हे गोदावरीचे नाभिस्थान मानले जाते. नांदेडच्या लगत हे ठिकाण असून येथे मिळणारे उजव्या सोंडेच्या शंखाचे अश्मीभूत अवशेष (फॉसिल्स) व स्थलमाहात्म्य यांचा अन्वयार्थ लावता येतो. येथील योगनरसिंह मंदिरातील असलेली योगपट्ट धारण केलेल्या नरसिंहाची मूर्ती (उत्तर चालुक्य काळातील) ही नरसिंह या विष्णूच्या अवताराची उन्नयनविषयक टप्प्यातील महत्त्वाची मूर्ती ठरते.

मंथनी हे गोदावरीचे कटीस्थान मानले जाते. याचे एक नाव ’मंत्रकूट’ असे आहे. धर्मापुरी व मंथनी ही दोन्ही स्थाने आजच्या तेलंगण प्रांतात येतात. येथील भिक्षेश्वर मंदिर हे मुळात नवव्या-दहाव्या शतकातील आहे. अलीकडे त्याचा जीर्णोद्धार केला आहे. येथील गौतमेश्वर मंदिर संकुल हे १२व्या शतकातील आहे. मंथनी येथे अनेक शिवस्थाने आहेत. फार पूर्वी हे एक प्रमुख शैव केंद्र म्हणून प्रसिद्धी पावले असावे. श्री. म. अ. ढाकी यांनी या स्थानाचे वर्णन करताना काकतीय राजवंशाचा राजा रुद्रदेव याच्या काळात त्रिनेत्र देवाचे म्हणजे शिवाचे मंदिर इ. स. ११७१ मध्ये उभारले असे म्हटले आहे. याशिवाय काकतीय राजा गणपतीदेव याच्या काळातील दि. २६ डिसेंबर ११९९ या दिवशीचा शिलालेख देवनागरी व संस्कृत भाषेतील आहे. सांस्कृतिक इतिहासाच्या दृष्टीने तो महत्त्वाचा ठरतो. काळेश्वर हे स्थान गोदावरी आणि प्राणहिता या नद्यांच्या संगमावर वसलेले आहे. येथे विजयनगरचा राजा हरिहर (द्वितीय) याने केलेल्या तुलापुरुषदानाची नोंद अभिलेखात उपलब्ध आहे. वैष्णवांच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाच्या असलेल्या भद्राचलम या ठिकाणी प्रतिरामदास मानला गेलेला कारचेला गोपन्ना हा संतकवी होऊन गेला.

राजमहेंद्री हे गोदावरीचे चरणस्थान. येथे मानवी वसाहतीचे अस्तित्व प्रारंभिक ऐतिहासिक काळापासून असावे. या स्थानाजवळ सातवाहनकालीन पुरातत्त्वीय गर्भक्षेत्र स्पष्ट झाले आहे. गावामध्ये अनेक मंदिरे असून कोटीलिंगेश्वर मंदिर, वेणुगोपालस्वामी मंदिर, लक्ष्मीनरसिंह मंदिर या वास्तू १९व्या शतकात मूळ ठिकाणी पुन्हा बांधल्या गेलेल्या दिसतात. येथे कुंभमेळ्याप्रमाणेच ‘पुष्कराळू’ हा महोत्सव दर १२ वर्षांनी साजरा केला जातो. यातील पहिले १२ दिवस ‘आदिपुष्करम’ व शेवटचे १२ दिवस ‘अंत्यपुष्कराळू’ म्हणन ओळखले जातात.

गोदावरीच्या काठी असलेले, द्राक्षाराम हे एक महत्त्वाचे ठिकाण असून, येथील भीमेश्वर स्वामी मंदिरातील शिवपिंड आकाराने भव्य आहे. या लिंगाला ’मूळविराटरूप’ असे म्हणतात. हे मंदिर येथे असलेल्या ३८१ शिलालेखांसाठी प्रसिद्ध आहे. हे शिलालेख इ. स. १०८० ते इ. स. १३३४ या काळातील आहेत. हे पूर्व चालुक्य, पश्चिमी चालुक्य, कलिंग, गंग व काकतीय राजवंशांचे श्रद्धास्थान आहे. एकूणच गोदावरी संस्कृतीच्या समग्र अभ्यासासाठी तिच्या अष्टांग स्थानांचे योगदान महत्त्वाचे असून, त्या सर्वांचा येथे साकल्याने आढावा घेण्यात आला आहे. अशा प्रकारे घेतलेला आढावा बहुधा प्रथमच नोंदवला गेलेला आहे.

गोदा संस्कृती (भाग तीन)

या खंडात गोदावरीचे विशाल स्वरूप व गोदा संस्कृतीचे विविध पैलू स्पष्ट करण्याचा प्रयत्न केला आहे. या प्रकल्पात विविध क्षेत्रांतील मान्यवरांचे योगदान लाभले आहे. ’सच्चे भण गोदावरी’ या शीर्षकाखाली लिहिलेली प्रकल्पाचा आढावा घेणारी प्रस्तावना डॉ. रा. मोरवंचीकर यांनी लिहिली आहे. ’गोदावरीचे प्राचीन पर्यावरण’ या विषयाचा भूपुरातत्त्वीय दृष्टिकोनातून डॉ. शरद राजगुरू यांनी आढावा घेतला आहे. गोदाखोर्‍यातील पुराजीवशास्त्रीय इतिहास तसेच गोदावरी खोर्‍यातील अभिलेखांची नोंद करण्यात आली आहे. गोदाखोर्‍याच्या इतिहासाचा म्हणजे अप्पर गोदावरी, मध्य गोदावरी (म्हणजे गोदा-मांजरा संगमापासून गोदा-प्राणहिता संगमापर्यंतचे क्षेत्र व त्याचे उपखोरे) आणि त्यानंतर येणारा त्रिभुज प्रदेश (लोअर गोदावरी) अशा तीन भागांतील विविध राजवटींचा आढावा या ग्रंथात घेतला आहे. तसेच गोदाखोर्‍यातील समाज व लोकजीवन यांची नोंद स्वतंत्रपणे घेण्यात आली आहे.

भूशास्त्रीय दृष्टिकोनातून गोदाखोर्‍याचा केलेला विचार उद्बोधक ठरतो. गोंडवन क्षेत्रात सुमारे १५ कोटी वर्षांपूर्वी एका महान हिमयुगाची सुरुवात झाली. हे हिमयुग जवळपास एक कोटी वर्षे अस्तित्वात होते. यानंतर गोदाखोर्‍यातील पर्यावरणात बदल होत गेले. याच काळात (साधारण आठ कोटी वर्षांपूर्वी) नागमोडी वळण घेऊन, वायव्येकडे वाहणारी गोदावरी नदी अस्तित्वात आली. ही नदी बारमाही वाहणारी होती. सुमारे सहा कोटी वर्षांपूर्वी ज्वालामुखीच्या भेगीय आणि द्रोणीय उद्रेकामुळे गोदावरी नदी बेसॉल्टच्या थराखाली लुप्त झाली. सुमारे अडीच कोटी वर्षांपूर्वी भारत हा आशिया खंडाचा भाग झाला व यानंतर नैऋत्य मोसमी पावसाची सुरुवात झाली. सह्याद्रीच्या कुशीत जन्म घेऊन वाहणारी गोदावरी नदी त्या काळी प्रथम पूर्वेस साधारण ५०० किलोमीटर व त्यानंतर आग्नेयेस सुमारे ७०० किलोमीटर प्रवास करून बंगालच्या उपसागरास मिळत असे.

दख्खनमधील सर्वात जास्त लांबी असलेली ही नदी असून, तिचे खोरे खचदरी आणि घनदाट जंगलांनी युक्त आहे. गोदावरीचे खोरे साधारणतः समद्विभुज त्रिकोणाच्या आकाराचे असून, गोदावरी मुख्यतः त्या त्रिकोणाच्या पायथ्याशी समांतर वाहताना दिसते. हिच्या खोर्‍यात असलेल्या कोळसा व हिर्‍यांच्या खाणी ही भारताला मिळालेली देणगी आहे. आज दिसणारे गोदावरीचे स्वरूप (१,४६५ किलोमीटर लांबीचे पात्र) तिला मध्य प्लायस्टोसीन काळात (सुमारे सहा ते सात लक्ष वर्षांपूर्वी) प्राप्त झाले. येथे मानवी अस्तित्वाचे पुरावे अश्मयुगापासून उपलब्ध होतात. मध्याश्मयुगीन मानवाला तर पर्यावरणाच्या दृष्टीने संपूर्ण खोरे नंदनवनासारखे होते. गोदावरी खोर्‍याचे भूशास्त्रीय तपशील प्रदीप वेसनेकर यांनी नोंदवले आहेत. गोदावरी खोर्‍यातील जलव्यवस्थापनाचा भाग म्हणून या खोर्‍यात २८६ मोठे व मध्यम प्रकारचे सिंचन प्रकल्प उभारले गेले आहेत.

गोदा संस्कृतीचा आढावा घेताना, तिच्या आसपासच्या गावांचा/शहरांचा सांस्कृतिक इतिहास, तिच्या काठावरील वसाहतींची वैशिष्ट्ये, लोकसाहित्य व परंपरा यांचा आढावा डॉ. अरुणा ढेरे यांनी घेतला आहे. गोदा काठावरील यज्ञपरंपरेची नोंद केली गेली आहे. या खोर्‍यातील बौद्ध व जैन परंपरांचा आढावा घेण्यात आला आहे. येथील मंदिर स्थापत्याचा परिचय डॉ. गो. बं. देगलूरकर यांनी करून दिला आहे. या खोर्‍यातील विविध धर्म, संप्रदाय, चक्रधर स्वामींचा महानुभाव पंथ, ज्ञानेश्वर व वारकरी संप्रदाय, भागवत परंपरा व एकनाथ महाराज, रामदासी संप्रदाय, शीख संप्रदाय या प्रमुख व अन्य संप्रदायांचीही ओळख करून देण्याचा प्रयत्न केला आहे. येथील कुंभमेळा व पुष्कराळू तसेच या खोर्‍यातील अन्य उत्सव व परंपरांची नोंद केली आहे.

योगी अरविंद यांनी आपल्या ’भारतीय संस्कृतीचा पाया’ या ग्रंथात भारतीयांच्या मनातील मूलभूत संकल्पनांविषयी व्यापक चर्चा करून संस्कृतीची वैशिष्ट्ये, योगदान, यथार्थता यांचा परामर्श घेतला आहे. हे लक्षात घेता, आपण गोदाकाठच्या सांस्कृतिक जीवनाचा आढावा घेतो, तेव्हा तेथील संस्कृतीचे सातत्य स्थलकालाच्या आरोह-अवरोहातून सलगपणे प्रवाहित असल्याचे जाणवते. कधी ही गती मंदावली; पण अनंताची ओढ सातत्य टिकवून ठेवण्यात यशस्वी ठरली. या अभ्यासानंतर मध्य भारताला दक्षिण भारताशी जोडणारे, गोदावरीचे खोरे हे संयोग भूमी असल्याचे प्रकर्षाने जाणवते. मुख्य नदीप्रवाह व तिला मिळणार्‍या महत्त्वाच्या उपनद्या यांच्या काठी असलेली विविध सांस्कृतिक वैशिष्ट्ये आपले अस्तित्व टिकवून ठेवतात. या प्रकल्पातून गोदाखोर्‍याचे एकात्म दर्शन होते.

या बृहत् प्रकल्पात गोदाखोर्‍यातील सांस्कृतिक जीवनाचा परिचय करून देताना, गोदा संस्कृतीच्या महावस्त्रातील विविध धाग्यांना स्पर्श केला असून, गोदासंस्कृतीचे विविध पैलू स्पष्ट केले आहेत. या प्रकारे केलेले हे काम निश्चितच साहित्य व संस्कृतीच्या अभ्यासासाठी एक बहुमूल्य दस्तऐवज आहे.


नाशिक; महाराष्ट्राच्या उत्तरेकडील भागात वसलेले हे शहर नाशिक म्हणूनही ओळखले जाते. नाशिक हे महाराष्ट्रातील सर्वात महत्त्वाच्या शहरांपैकी एक आहे. हे शहर त्याच्या सुंदर परिसरासाठी आणि थंड आणि आल्हाददायक हवामानासाठी आकर्षणाचे केंद्र आहे. नाशिकचा इतिहास त्याच्या पौराणिक, ऐतिहासिक, सामाजिक आणि सांस्कृतिक महत्त्वासाठी ओळखला जातो.हे दर बारा वर्षांनी एकदा भव्य सिंहस्थ कुंभमेळा भरणाऱ्या चार शहरांपैकी एक आहे. गोदावरी नदी शहरातून वाहते; गोदावरी नदीच्या काठावर मंदिर घाट आहेत; नाशिक हे जगभरातील हिंदूंसाठी सर्वात पवित्र ठिकाणांपैकी एक आहे. नाशिक शहर दुर्गा, गणेश, चित्रघंटा, पांडव, डिंगेरअली, म्हसरुळ, जोगवाडा, पठाणपुरा आणि कोकणी या नऊ टेकड्यांनी वेढलेले आहे.

प्राचीन काळापासून, हे भारतातील व्यापार आणि व्यापाराचे केंद्र होते. पुरातत्व उत्खननात असे आढळून आले की नाशिकच्या आसपासचा प्रदेश पाषाण युगाच्या सुरुवातीच्या काळात व्यापलेला होता. पांडू (बौद्ध) आणि चामर (जैन) मंदिर गुहा यासारखी पुरातत्वीय स्थळे नाशिकमध्ये आहेत.

नाशिकच्या इतिहासात वेगवेगळ्या युगांमध्ये शहराची वेगवेगळी नावे नोंदवली गेली आहेत. सत्ययुगात ते 'पद्मनगर' या नावाने ओळखले जाते, 'तेत्रयुगात' ते 'त्रिकंटक' या नावाने ओळखले जाते, 'द्वापारयुगात' ते 'जनस्थान' या नावाने ओळखले जाते आणि शेवटी 'कलियुगात' ते 'नवशिख' किंवा 'नाशिक' या नावाने ओळखले जाते. १८१८ मध्ये पेशव्यांनी या शहरावर ताबा मिळवला तेव्हा या शहराला त्याचे सध्याचे नाव मिळाले. पेशव्यांनी थोड्या काळासाठी या शहरावर नियंत्रण ठेवले आणि नंतर हे शहर ब्रिटीश साम्राज्याच्या ताब्यात गेले. जेव्हा मुघलांनी हे शहर ताब्यात घेतले तेव्हा त्यांनी या शहराचे सौंदर्य पाहून गुलशनाबाद असे नाव ठेवले. परंतु, १७५२ मध्ये जेव्हा मराठ्यांनी हा प्रदेश परत मिळवला तेव्हा त्यांनी या शहराचे नाव नाशिक ठेवले.

रामायणात नाशिकच्या इतिहासाचा उल्लेख आपल्याला आढळतो. रामायणसारख्या भारतीय महाकाव्यात नाशिकला 'पंचवती' असेही नाव देण्यात आले आहे. जेव्हा रामाची सावत्र आई कैकयीने भगवान राम आणि सीतेला अयोध्या सोडण्यास सांगितले तेव्हा ते दोघेही निघून गेले. तथापि, मोठा भाऊ रामाच्या प्रेमामुळे लक्ष्मण देखील या दोन्ही जोडप्यांसह १४ वर्षांच्या वनवासात अयोध्या सोडून गेला.

पंचवतीला पवित्र महत्त्व प्राप्त झाल्यामुळे राम, सीता आणि लक्ष्मण काही काळ पंचवती येथे राहिले. पंचवतीला पाच वडाच्या झाडावरून हे नाव पडले कारण तेथे पाच मोठ्या वडाच्या झाडांची वाढ झाली होती. पंचवती हे असे ठिकाण होते जिथे या त्रिकुटाने वनवासासाठी आपले निवासस्थान बनवले होते. त्यांच्या वनवास काळात रावणाची बहीण शूर्पणका हिने रामाला मोहात पाडण्याचा प्रयत्न केला. रामाने क्रोधित होऊन लक्ष्मणाला शूर्पणकाचे नाक कापण्याचा आदेश दिला आणि शहराचे नाव नाशिक पडले. भगवान विष्णूने येथे तीन राक्षसांना पराभूत केले अशी श्रद्धा आहे; म्हणूनच या शहराला 'त्रि-कंटक' असेही नाव देण्यात आले आहे.

नाशिकच्या इतिहासात, मौर्य साम्राज्य, सातवाहन, अभिरस, त्रैकुटक, विष्णुकुंडिन, कलचुरी, चालुक्य, बदामीचे चालुक्य, राष्ट्रकूट राजवंश, यादव अशा अनेक राजवंशांनी या शहरावर राज्य केले आहे.

 

नाशिकचा इतिहास

 

नाशिकमधील सातवाहन राजवट (BC 207 – 199 CE)

सम्राट अशोकाच्या मृत्युनंतर सातवाहन साम्राज्य सत्तेत आले. राजाच्या काळात सातवाहन साम्राज्याने नाशिकवर राज्य केले. नंतरच्या काळात, पश्चिम क्षत्रपांच्या राजा शकाने जिंकलेल्या माळवा, नाशिक, महाराष्ट्रातील काठियावाड असे अनेक सातवाहन प्रदेश पश्चिम क्षत्रपांच्या राजा नहापनने देखील राज्य केले होते; कोकण, पुणे, नाशिक आणि महाराष्ट्रातील काही इतर जिल्ह्यांचा भाग आणि मध्य भारतातील काही भाग, उत्तरेकडे अजमेरपर्यंत. राजा नहापननेच नाशिकमध्ये पांडव-लीनला उत्तेजित केले होते. गौतमीपुत्र सातकर्णीच्या कारकिर्दीत सातवाहन साम्राज्याने पुन्हा नाशिकवर ताबा मिळवला. सातवाहन साम्राज्याच्या गौतमीपुत्र सातकर्णीने पश्चिम क्षत्रपांच्या नहापनाचा पराभव केला आणि नाशिकचा प्रदेश आपल्या ताब्यात आणला. गौतमीपुत्र सातकर्णीनंतर, त्यांचे उत्तराधिकारी यज्ञश्री सातकर्णी हे सातवाहन साम्राज्याचे सर्वात उल्लेखनीय शासक होते.

 

नाशिकचा इतिहास

 

अभिरका राजवंशाचा उदय (220 CE - 377 CE)

सातवाहन साम्राज्याच्या पतनानंतर, अभिराक राजवंश सत्तेवर आला. अभिराकांनी सुमारे ६७ वर्षे राज्य केले; त्यांनी ईशान्येकडील भागात आणि महाराष्ट्र आणि कुंतला येथील चुटेंवर राज्य केले. शिवदत्तचा मुलगा राजा ईश्वरसेन हा अभिरा राजवंशाचा संस्थापक होता.

ट्रायकुटाकस

त्रैकुटक राजवंशाने त्यांचे नाव नाशिक जिल्ह्याच्या पश्चिमेला असलेल्या त्रिकुट पर्वतावरून घेतले. नाशिक जिल्हा आणि गुजरातमध्ये सापडलेल्या शिलालेख आणि नाण्यांवरून इंद्रदत्त, दह्रसेन आणि व्याघ्रसेन हे तीन त्रैकुटक राजे ओळखले जातात. त्रिकुटांचा उल्लेख उत्तर कोकणातील कालिदास रघुवंशात आढळतो, जिथे ते स्थित आहेत.

 

नाशिकचा इतिहास

 

विष्णुकुंडी

सहाव्या शतकात, जेव्हा वाकाटक राजवंश कमी होऊ लागला, तेव्हा विष्णुकुंडिनांचा राजा माधववर्मन पहिला याने विदर्भ प्रदेशावर कब्जा केला. माधववर्मन पहिला; याने वाकाटक राजवंशातील शेवटच्या शासक राजा हरिषेण पहिला याच्या मुलीशी लग्न केले. त्याने वाकाटक राजवंशाच्या कमकुवतपणाचा फायदा घेत आपले राज्य दूरवर पसरवले. राजा माधववर्मन पहिला याने अकरा अश्वमेध यज्ञांसह अनेक यज्ञ केले. आपल्या राजवटीत त्याने पश्चिम महाराष्ट्राचा प्रदेश आपल्या ताब्यात आणला.

कालाचुरी (५५० इ.स.-५७३ इ.स.)

५५० मध्ये कालाचुरी राजा कृष्णराजाने विष्णुकुंडिन राजाला महाराष्ट्र आणि विदर्भातून हाकलून लावले. राजा कृष्णराजाने पूर्वीच्या इंदूर राज्यातील महिष्मती, आधुनिक महेश्वर येथून राज्य केले होते. कृष्णराजाच्या जागी त्याचा मुलगा शंकरगण आला; त्याने आपले राज्य मालव्यापासून दक्षिणेकडील नाशिक आणि औरंगाबाद जिल्ह्यापर्यंत वाढवले. शंकरगणानंतर त्याचा मुलगा बुद्धराज त्याच्यानंतर आला. सिंहासनावर बसल्यानंतर बुद्धराजा; त्याच्या राज्यारोहणानंतर लगेचच त्याच्या राज्याच्या दक्षिण सीमेवर चालुक्य राजा मंगलेशाशी संघर्षात सहभागी झाला.



गरज वारसा सर्वेक्षणाची!

नाशिक एक ऐतिहासिक संस्कृती पुढे घेऊन जाणारं गाव आहे. येथील समृद्ध सांस्कृतिक ऋणानुबंधाला लोकसंस्कृतीचे कोंदण लाभले आहे. येथील प्रत्येक वारसा हा प्रत्येक श्वासातून समूहमनाचा ठेका घेताना दिसतो. प्रत्येक वारशामध्ये संस्कारसक्षम स्पर्श अनुभवता येतो. हा वारसा जपण्यासाठी तो नेमका कुठे, कसा जगतो आहे, हे शोधायलाच हवे. म्हणून गरज आहे वारसा सर्वेक्षणाची.

मानवी संस्कृतीच्या विकासात वारसा निर्मितीला महत्त्वाचे स्थान आहे. जगण्याच्या सजगतेतून प्रथा, परंपरांचा जन्म झाला. आपल्या आजूबाजूला जे काही घडतं आहे, त्याच्या नोंदी गुफांमध्ये चित्रांच्या माध्यमातून रेखाटला गेला. शिकार, शेती, लग्न, मिरवणुका, लढाईचे प्रसंग हजारो वर्षांपासून जपलले आपण पाहतो. वारसा विकासालाही टप्पे होते, असे म्हंटले तर वावगे ठरू नये. गुफांमधील ही चित्र पुढे मूर्ती कलेतून दिसू लागली. भाषा, लिपी विकसित होऊ लागली अन् चित्रांच्या जागी रेषांनी आकारलेली लिपीही एक वारसा ठरली. निसर्गाकडून माणूस देव या संकल्पनेकडे वळाला. मूर्तीपूजा जसजशी विकसित झाली तसतशी

लेणी, मंदिरे आकाराला येऊ लागले. भाषाही दरम्यानच्या काळात बोलकी होऊ झाली. वस्ती करून राहू लागलेला माणूस आपल्या पाऊलखुणा सिंधू-सरस्वती संस्कृतीसारख्या स्थळांतून अगदी नाशिक-जोर्वे सारख्या स्थळांपर्यंत पुढच्या पिढ्यांसाठी वारसा म्हणून उभ्या ठाकल्या. उत्खननातून आता या पाऊलखुणा समोर आल्याने मानवी संस्कृती कधी अन् कशी बहरली हे समोर आले आहे. ही स्थळे आपला वारसा ठरू लागली आहेत. पण माणूस येथेच थांबला नव्हता. त्याने प्रगतीची कास कधी सोडली नाही. राहण्यासाठी घरे, जगणे सोपे करण्यासाठी वेगवान हत्यारे, गरजेची भांडी, जगण्यासाठी अन् मेल्यानंतर काय या नीतीमूल्यांची ठेवण सुरू केली. पंथ, धर्म, सत्तेतील जयविजय, आक्रमण, सत्तांतर, व्यापार हे बदल जसजसे मानवाने स्वीकारले तसतशी त्याच्या जगण्यातील बदलही पुढे आले. बदलाचे आव्हानही त्याने स्वीकारले अन् लेणी, प्राचीन मंदिरे, गडकिल्ले, वाडे, नदी, लोकसंस्कृती, सणउत्सव, प्रथा, परंपरा, चित्रकला, काष्ठशिल्प, देवदेवतांची शिल्पे, लोककला, लोककथा, अख्यायिका, गीते, संस्कार हे सर्वकाही त्याने अन् आपण आपल्या पुढच्या पिढ्यांसाठी जपून ठेवले. बदलत्या काळानुसार यातील अनेक वारसास्थळे (स्थळ म्हणजे फक्त वास्तू नव्हे; लोकपरंपरा, प्रथा देखील.) लोप वापली, काही नव्याने निर्माण झाली तर अनेक वारसास्थळे लोप वापण्याच्या स्थितीत आहेत. या लोप वापत असलेल्या दृश्य अन् अदृश्य वारसा स्थळांचे जिल्ह्यानुसार सर्वेक्षण होणे व त्यावर चिंतन होणे आवश्यक आहे. असे न झाल्यास हा वारसा हातातून निसटेल ही भीती कायम आहे. फक्त पुरातत्त्व विभाग सर्वच वारसा स्थळांचे संवर्धन करण्यात सक्षम नाही. त्यामुळे आपला वारसा लोकांनीच जपायला हवा, यासाठी एक मोठी चळवळ उभारण्याची गरज निर्माण झाली आहे. मात्र यासाठी नेमक्या कोणत्या पद्धतीने कामाला सुरूवात झाली पाहिजे. याबाबत मार्गदर्शन व जिल्ह्यातील वारसास्थळांचे सर्वेक्षणाचा गोवर्धन पर्वत पुरातत्त्व व गॅझेटिअर या दोन विभागांनी उचलायला हवा. या दोन विभागांवर जबाबदारी टाकण्यात अथवा त्यांच्याकडून अपेक्षा करण्याच कारणही तसं आहे. राज्य पुरातत्त्व विभागाच्या संचालकपदी असलेले तेजस गर्गे अन् गॅझेटिअर विभागाच्या कार्यकारी संपादक व सचिवपदी असलेले डॉ. दिलीप बलसेकर हे दोघेही नाशिककर आहेत. त्यामुळे त्यांच्याकडून अपेक्षाही खूप आहेत. वारसा संवर्धन क्षेत्रात चांगले काम अपेक्षित असेल तर त्यांना नाशिककरांनीही योग्य साथ द्यायला हवी अन् या विभागांना लोकसहभाग आवश्यक असेल तर वारसा सर्वेक्षण, संवर्धन, जतनाची कामे कशी केली जातात याचे प्रशिक्षण त्यांनी नाशिककरांना द्यायला हवे. तरच वारसा जतन अन् संवर्धनाच्या विकासवाट अधिक समृद्ध अन् सोप्या होतील. मात्र, यापूर्वी गरज आहे ती आपल्या जिल्ह्यात नोंदविल्या न गेलेल्या गावागावांतील वारसा स्थळांच्या सर्वेक्षणाची. अशा सर्वेक्षणातूनच एकमेकांतील दूरावा दूर करून संवाद निर्माण करता येईल.

वारसा म्हणजेच हेरिटेजबाबत लोकांमध्ये जनजागृती होत आहे. जुनं ते सोनं याचही महत्त्व लोकांच्या लक्षात येऊ लागलं आहे. त्यामुळे आपण आता जतन, संवर्धन प्रक्रियेकडे वळायला हवं. मात्र वारसा स्थळांचं जतन-संवर्धनापूर्वी गावागावांतील वारसा नेमका काय आहे, कोणत्या स्थितीत आहे यावर मंथन व्हायला हवं. ऐतिहासिक, सांस्कृतिक व कलात्मक वारसा शोधणं, मिळणं ही सर्वेक्षणाच्या पातळीवर पहिली मोहीम. या वारशाची नोंद घेणे ही दुसरी पायरी. तर मिळालेल्या वारशाचे विश्लेषण, त्याची स्थिती अन् त्यासाठी काय करता येर्इल ही वारसा संवर्धन आणि जतनची शेवटची पायरी ठरते. उदाहरणच द्यायचे झाले तर गोदाकाठी पूर्वी चित्रकथी नावाची एक लोककला सादर व्हायची. ही आता फक्त कोकणात दिसते. गोदाकाठी कागदावर, कापडावर काढलेल्या चित्रांच्या मदतीने त्या चित्रांचे वर्णन गीतातून केले जायचे. रामायण, महाभारत, अनेक अख्यायिकांचे हे हक्काचे ठिकाण होते. जनजागृतीचे संदेशही या चित्रकथीतून दिले जायचे मात्र आता ही लोककला नामशेष झाली आहे. अशीच आणखी एक लोककला म्हणजे बोहाडे. गावागावांतील उत्सवांमधून सादर होणारे बोहाडे, आखाडी आता बंद होऊ लागले आहेत. बोहाड्यांना दारूची लागण झाल्याने या कार्यक्रमांमधून होणारा वाद नको म्हणून हा लोककला प्रकार नामशेष होण्याच्या मार्गावर आहे. तर काही गावांनी हा वारसा काळजाशी जपला आहे. या महत्त्वाच्या घटनेची नोंद मात्र ना पुरातत्त्व विभागाने घेतली आहे ना गॅझेटिअर विभागाने. कॉर्पोरेट संस्था प्रदर्शनापुरत्याच लोककलांचा आधार घेताना दिसतात. पण ठोस काम त्या करताना दिसत नाहीत. अशाच उपेक्षेतून बोहाडे ही परंपरा बंद होत आहे.

बोहाडे लोककलेचा एक भाग असूनही लोककथा नामशेष होण्याच्या मार्गावर आहेत. फक्त लोककलाच नाही तर या लोककलेवर विसंबून असलेले कलाकारही विवंचना सहन करीत जगत आहेत. सरकारने पुढाकार घेऊन सुरू केलेले उपक्रमही ढेपाळले आहेत. हरसूल येथे मुखवट्यांचे संग्रहालय उभारण्यात आले. पण, दुर्लक्ष अन् इच्छाशक्तीच्या अभावामुळे सर्वकाही कुलपात पडून आहे. उत्साहाच्या भरात लाखो रूपये खर्च करून उपक्रमांचे काय होते हे हरसूलचे उदाहरण ताजे आहे. बोहाडे परंपरा अन् त्यांच्या मुखवट्यांना लोकाश्रय अन् सरकारचा आश्रय मिळाला तर लोककलेचे जतन अन् संवर्धन होर्इल. शिवाय, ग्रामीण भागात रोजगार निर्मितीलाही वेग येर्इल. अशीच तऱ्हा आहे आदिवासी लोककला, कलाकार अन् प्रथा, परंपरांची. राष्ट्रीय पातळीवर वाद्य वाजवणारे कलाकार नाशिकमध्ये आहेत. मात्र त्यांना राजाश्रय नसल्याने त्यांची कला नामशेष होण्याच्या स्थितीत आहे. सध्या अनेक कलाकार मोलमजुरी करून जीवन कंठत आहेत. याचे उत्तम उदाहरण म्हणजे प्रसिद्ध तारपा वादक हरी दत्ता चारस्कर. हा कलाकार वारसा नाही का? त्यांना जपण्यासाठी प्रयत्न करायला नकोत का? त्यांची कला पुढच्या पिढ्यांकडे जाऊ शकेल, असे वारसा लोककला विद्यापीठ नाशिकमध्ये उभे राहू शकत नाही का? या प्रश्नांची उत्तरं फक्त विचारमंथन करून मिळणार नाहीत. कारण, जागेवरून बसून मंथन करण्यापलीकडे म्हणजे नाशिकचा नेमका वारसा काय आहे अन् तो जपण्यासाठी काय करायला हवे यावर आता फिल्डवर्क या ठोस उपाययोजनेची गरज आहे.

नाशिकमधील प्राचीन मंदिरांची स्थिती तर अत्यंत दयनीय आहे. हा वारसा जपला जावा असे कोणालाही वाटत नाही, अशी परिस्थिती आहे. याचा फायदा एखादा नेता, अँटिक वस्तूंचा एजंट घेताना दिसतो. गावात नवीन मंदिर बांधून देतो म्हणून गावातील जुन्या मंदिरातील शिल्प ट्रक भरून घेऊन गेल्याची उदाहरणे नाशिकमध्ये कमी नाहीत. यास आपली मानसिकताही तितकीच कारणीभूत आहे. मंदिर भग्न झालं, शिल्प भंगली म्हणजे अनिष्ट काही होर्इल, या भीतीने अनेक गावकऱ्यांनी ही प्राचीन शिल्प, मूर्ती चक्क ट्रक भरून समुद्रात नाहीतर नदीत सोडून दिल्याची उदाहरणेही नाशिकमध्ये सापडतात. अशा एजंटांना रोखण्यासाठी आपल्याकडे कोणतीही व्यवस्था नाही. कायदा आहे पण कोणी तक्रार करीत नाही, तोपर्यंत हा कायदा कोणतीही भूमिका घेताना दिसत नाही. या सगळ्यामुळेच वारसा अज्ञात आहे अन् नष्ट होण्याच्या स्थितीत आला आहे.

वीरगळ, प्राचीन मंदिरे, इतिहास, मंदिरांवरील चित्र, प्राचीन मठ, पेशवेकालीन वाडे, वीरगळी, आदिवासींचे चिरे, बारवा, यादवकालीन विहीरी, ऐतिहासीक जलयोजना, नदीवरील घाट, शिलालेख, ताम्रपट, पोथ्या, जुनी कागपत्रे असा अन् खुपसा वारसा जपण्यासाठी जोपर्यंत गावागावातून सर्वेक्षण करून नोंदी होत नाहीत. तोपर्यंत अवतीभवती वारसा आहे, तो जपला पाहिजे अन् त्यातूनही आपल्या गावाचा विकास होऊ शकतो ही भावना ग्रामस्थांमध्ये जोपर्यंत रूजविण्यासाठी प्रयत्न होत नाही, तोपर्यंत सगळे प्रयत्न निरर्थक ठरतील. पुरातत्त्व अन् गॅझेटिअर या दोन विभागांना लोकाभिमुख व्हायचे असेल तर त्यांनी त्याची सुरूवात अशा सर्वेक्षणातून करायला हवी. तरच लोकांना त्यांच्याबद्दल विश्वास निर्माण होर्इल. या चळवळीला लोक पाठिंबा, सहभाग मिळेल अन् वारसा जनतसंवर्धनाचा श्रीगणेशाही होर्इल. 



 
divyamarathi.bhaskar.com

स्‍वातंत्र्यापूर्वी येथे छापली गेली भारत सरकारची पहिली नोट, अशी झाली प्रिंटिंग

दिव्य मराठी

वर्ष 1924 मध्‍ये इंग्रजांनी नाशिकच्‍या करेंसी नोट प्रेसची स्‍थापना केली.

मुंबई - सर्वसामान्यांचा सोन्यात गुंतलेला जीव आणि सोने आयातीत खर्ची पडणारे परकीय चलन या दोन परस्परविरोधी गोष्टींची सांगड घालण्‍यासाठी गोल्ड मॉनेटायझेशन स्कीम, गोल्ड बाँड्स आणि अशोक चक्र धारण केलेले सोन्याचे नाणे या तीन योजना केंद्रीय अर्थमंत्री अरूण जेटली यांनी जाहीर केल्या. यातील सोन्‍याचे नाणे हे 5 आणि 10 ग्रॅमचे असणार आहे. त्‍याची मोल्डिंग ‘सिक्युरिटी प्रिंटिंग अँड मिंटिंग कॉरपोरेशन ऑफ इंडिया’ करत आहे. हीच संस्‍था भारतीय नोटांचेही प्र‍िटिंग कामकाज पाहते. त्‍या अनुषंगाने divyamarathi.com सांगणार आहे भारतातील पहिली नोट कुठे छापली गेली आणि ती कधी चलनात आली, याची खास माहिती....

वर्ष 1924 मध्‍ये झाली स्‍थापना
वर्ष 1924 मध्‍ये इंग्रजांनी नाशिकच्‍या करेंसी नोट प्रेसची स्‍थापना केली. 1925 पासून या प्रेसमध्‍ये पोस्टल स्टेशनरी आणि स्‍टॅम्प्सची प्रिंटिंग सुरू झाली. याच प्रेसमध्‍ये 1928 मध्‍ये पहिल्‍यांदा भारत सरकारच्‍या पाच रुपयांच्‍या नोटेची छपाई करण्‍यात आली. वर्ष 1980 पर्यंत सिक्युरिटी प्रेसमध्‍येच नोटा छापण्‍याचे काम सुरू होते. नंतर चलनी नोटांसाठी वेगळी प्रेस तयार करण्‍यात आली. पुढे या संस्‍थांनी स्‍वत:ला केंद्र सरकारपासून वेगळे करून घेत 10 फेब्रुवारी 2006 सिक्युरिटी प्रिटिंग-मिंटिंग कॉरपोरेशन ऑफ इंडिया लिमिटेडची स्‍थापना केली. आता ती अर्थ मंत्रालयाच्‍या नियंत्रणाखाली कार्य करते.

कुठे छापतात नोटा
आपल्या देशात नोटा ही भारत सरकारची मालमत्ता आहे. महाराष्‍ट्रातील नाशिक, मध्य प्रदेशातील देवास, कर्नाटकातील म्हैसूर, पश्चिम बंगालमधील सालबोनी या चार ठिकाणी छा नोट प्रेस आहेत. यातील एक टांकसाळ (मिंट) आणि एक पेपर मिल आहे. सालबोनी आणि कर्नाटकच्‍या मैसूर येथे 1000 च्‍या नोटा छापल्‍या जातात. देवासच्‍या नोटप्रेसमध्‍ये एका वर्षांत 265 कोटी रुपयांच्‍या नोटा छापल्‍या जातात. यात 20, 50, 100, 500 रुपयांचा समावेश आहे. नोटा छापण्‍यासाठी देवासमध्‍ये तयार केलेल्‍या शाईचाच वापर केला जातो. मध्‍यप्रदेशातील होशंगाबादमध्‍ये सिक्युरिटी पेपर मिल आहे. नोट छपाई पेपर होशंगाबाद आणि विदेशातून येतात.

 https://divyamarathi.bhaskar.com/news/mah-nmah-nas-first-note-press-of-india-in-nasik-marathi-news-5151540-pho.html
 

mymahanagar.com

गोदावरीने वळण घेतल्यानेच नाशिकला अध्यात्मिक, धार्मिक महत्व

Sushant Kirve

डॉ. कैलास कमोद यांनी उलगडला इतिहसकालीन खजिना
नाशिक : गोदावरी नदी औरंगाबाद व नांदेड शहरातून जात असली तरी नाशिक शहराला गोदावरीचे विशेष महत्व आहे. पूर्व वाहिनी असलेली गोदावरी नाशिक शहरातील रामकुंड या ठिकाणी दक्षिण वाहिनी होते. या वळणास विशेष धार्मिक महत्व आहे. ब्रिटीश अधिकार्‍यांनीसुद्धा १८८३ मध्ये गॅझेटमध्ये नोंद केली आहे. त्यामुळे नाशिकला अध्यात्मिक व धार्मिक महत्व आहे, अशी माहिती देत डॉ. कैलास कमोद यांनी नाशिकचा इतिहासकालीन खजिना नाशिककरांसमोर उलगडला. त्यास नाशिककांनी भरभरुन प्रतिसाद दिला.

निमित्त होते, स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त जिल्हाधिकारी नाशिक, राज्य पुरातत्व विभाग व नाशिक इतिहास संशोधन मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने गोदावरी नदी महोत्सवाचे. या महोत्सवाच्या तिसर्‍या दिवशी शुक्रवारी (दि.१७) गोदाघाटावरचे नाशिक या विषयावर डॉ. कैलास कमोद यांचे व्याख्यान सरकारवाड्यात आयोजित करण्यात आले होते. त्यावेळी ते बोलत होते.

डॉ. कैलास कमोद म्हणाले, नाशिक शहरात गोदावरीचे पात्र २०० मीटरचे आहे. गोदावरीचा गाळा वाहून जमा झालेल्या टेकड्यांवरचे ठिकाण हे मूळ नाशिक आहे. त्यामध्ये बुधवार पेठ, म्हसरुळ टेक, चित्रघंटा हे मूळ नाशिक आहे. या ठिकाणी हिंदू आणि मुस्लीम लोक राहत आले आहेत. पेशव्यांच्या सरदारांनी रामकुंड परिसरात मंदिरे बांधली. मंदिरांमुळे गावठाण तयार झाले. काळाराम मंदिर, सुंदर नारायण मंदिर, कपालेश्वर मंदिर, नीळकंठश्वर मंदिर, नारोशंकर मंदिरांमुळे नाशिकचे सौंदर्य टिकून आहे. मात्र, सुंदर नारायण मंदिराची दुरवस्था झाली आहे. २५० वर्षांपूर्वी रामकुंड बांधण्यात आला. या ठिकाणी गांधी ज्योत साकारण्यात आली. १९६९ मध्ये नव्याने यशवंत महाराज मंदिर साकारण्यात आले. तर शंभर वर्षांपूर्वी दुतोंड्या मारुतीची छत नसलेली मूर्ती साकारण्यात आली. ही मूर्ती पुढे पूररेषा म्हणून ओळखली जाऊ लागली. रामकुंडावर अस्थी विसर्जन होवू लागले. त्यामुळे नाशिकचे पर्यटन वाढू लागले. १८६५ मध्ये रेल्वे स्टेशन तयार झाले. त्यामुळे मुंबईचे पर्यटक नाशिकला येऊ लागले. १८९७ मध्ये मुंबई-आग्रा राष्ट्रीय महामार्ग तयार करण्यात आला. तो मुंबई नाका, अशोकस्तंभ, व्हिक्टोरिया पूलमागे जुना आडगाव नाका येथून पुढे धुळे, आग्रा, दिल्लीकडे गेला. परिणामी, उत्तर भारतीय भाविक मोठ्या संख्येने नाशिकला येऊ लागले.

यावेळी विजय निप्पाणीकर, नाणेसंग्रहक चेतन राजापूरकर, प्रा. आनंद बोरा, रमेश पडवळ, श्रीकांत बेणी आदी उपस्थित होते.

धार्मिकस्थळे, तीर्थक्षेत्र नाशिकची ताकद

नाशिकचा खरा विकास तीर्थक्षेत्र आणि गंगापूर धरणामुळे झाला आहे. धरणामुळे कृषी उत्पादनात वाढ झाली. शिवाय, उद्योगधंदे नाशिकला आले. त्यामुळे नाशिक समृद्ध झाले. धार्मिकस्थळे आणि तीर्थक्षेत्र ही नाशिकची ताकद आहे. नाशिकमध्ये कुंभमेळासुद्धा होतो. त्यामुळे ती ताकद भविष्यात वाढवल्यस नाशिकचा आणखी विकास होईल, असे डॉ. कैलास कमोद यांनी सांगितले.

नाशिककरांच्या सुखदु:खांची गोदावरी साक्षीदारी

नाशिककरांचे दैनंदिन जीवन गोदावरीशी निगडीत आहे. सर्व सण रामकुंडावर साजरे केले जात असायचे. कोणतेही खाद्यपदार्थ रामकुंडावर उपलब्ध असायचे. शिवाय, अस्थी विसर्जनसुद्धा गोदावरी नदीकाठी होत असल्याने गोदावरी नाशिककरांच्या सुखदुखांची साक्षीदार आहे.

या मंदिरातून दिसतो दुसर्‍या मंदिरातील दिवा

नाशिकमध्ये पहिल्यांदा १७२३ मध्ये कपालेश्वर मंदिर उंचावर साकारण्यात आले. त्यानंतर २५ वर्षांनी गोदावरीच्या नदीपात्रात सुंदर नारायण मंदिर साकारण्यात आले. १८५७ मध्ये राणी व्हिक्टोरिया पूल म्हणजे अहिल्यादेवी पुलामुळे सुंदर नारायण मंदिराच्या पायर्‍या झाकल्या गेल्या. सुंदर नारायण मंदिर हे स्थापत्य कलेचा चमत्कार आहे. सुंदर नारायण मंदिरातील मूर्तीवर दक्षिणायन आणि उत्तरायनातील पहिली सूर्यकिरणे पडतात. कपालेश्वर आणि सुंदर नारायण मंदिरे १८० अंशामध्ये साकारण्यात आली आहेत. या दोन्ही मंदिरांच्या गाभार्‍यात लावलेले दिवे भाविकांना कोणत्याही एका मंदिरातून पाहता येतात. त्यामुळे दिवाळीत नाशिककर दिवे बघण्यासाठी गर्दी करतात, असे डॉ. कैलास कमोद यांनी सांगितले.

गोदावरी , गिरणा नदीच्या संस्कृती, भाषेत फरक

नद्यांचा जनमाणसावर व्यापक परिणाम झाला आहे. गोदावरी आणि उपनद्यांमुळे नाशिक जिल्हा समृद्ध झाला आहे. गोदावरी आणि गिरणा नदीची संस्कृती वेगवेगळी आहे. गिरणा नदीकाठच्या कळवण, बागलाण, देवळा आणि मालेगाव तालुक्यातील खाद्यसंस्कृती व भाषेत फरक आहे. या ठिकाणी मांडा हा खाद्यपदार्थ नागरिक आवडीने खातात. तर गिरणाकाठच्या नागरिकांचे शब्दोच्चार वेगळे आहेत. शिवाय, नागरिक ऐरणी भाषासुद्धा बोलतात, असे डॉ. कमोद यांनी सांगितले.

भाविकांच्या मनातील अन् प्रत्यक्षातील गंगा नदी वेगळी

भारतात सर्वात मोठी गंगा नदी असून, गंगेचे पात्र २ हजार २२५ किलोमीटर आहे. निर्माल्यासह कारखान्यांचे पाणी मिसळत असल्याने पवित्र गंगा नदीचे हाल न पाहवणारे आहेत. भाविकांच्या मनातील गंगा नदी आणि प्रत्यक्षातील गंगा नदी वेगळी आहे, असे डॉ. कमोद यांनी सांगितले.

 https://www.mymahanagar.com/maharashtra/the-spiritual-and-religious-significance-of-nashik-is-due-to-the-turn-of-godavari/375644/



 




https://nashik-com.translate.goog/anant-kanhere/?_x_tr_sl=en&_x_tr_tl=mr&_x_tr_hl=mr&_x_tr_pto=tc

 

 
 
 
 








 
 
 







 
 


 
 

 

 

कहाणी ‘नासक’ हिऱ्याची

 nasak

महाराष्ट्रातल्या नाशिक शहरापासून जवळच असलेल्या प्रसिद्ध त्र्यंबकेश्वर मंदिरातील भगवान शिवशंकराच्या मुकुटाबद्दल एक खास गोष्ट अशी, की या मुकुटामध्ये एके काळी शोभत असणारा बहुमूल्य हिरा आता या मुकुटामध्ये नाही. एके काळी अनेक राजे महाराजे, मुघल सम्राट, धनाढ्य सावकार, अनेक रत्नांचे व्यापारी, इतकेच नाही तर खुद्द पेशव्यांच्या संग्रही असणारा हा हिरा ‘नासक ‘ या नावाने ओळखला जातो. तब्बल ४३.३८ कॅरट वजनाचा हा हिरा जगातील सर्वात मोठ्या आणि बहुमूल्य रत्नांपैकी एक आहे. एके काळी त्र्यंबकेश्वर मंदिरातील भगवान शंकराच्या मुकुटामध्ये हा हिरा जडविलेला असून, हे मंदिर बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक आहे.

या हिऱ्याला ‘नासक’ हे त्याचे नाव, नाशिक गावावरून पडले असल्याचे म्हटले जाते. अतिशय बहुमूल्य ‘होप डायमंड’, ‘ओर्लोव’, ‘द रीजेंट’ आणि ‘कोहिनूर’ या हिऱ्यांच्या प्रमाणेच नासक हिरा देखील आंध्र प्रदेशातील गोलकोंडा येथील कोलुर किंवा अमरागिरीपैकी कोणा एका खाणीतून मिळाला. दक्षिण अफ़्रिकेमध्ये हिऱ्याच्या खाणींचा शोध लागेपर्यंत गोलकोंडा येथे असणाऱ्या खाणी हिऱ्यांचे महत्वपूर्ण स्रोत होत्या. त्याकाळी अस्तित्वात असलेल्या नियमांच्या अनुसार या खाणींमध्ये सापडणारे मोठे हिरे सरकारी खजिन्यामध्ये जमा करावे लागत असत. १६८७ साली मुघल सत्तांनी गोलकोंडा आपल्या ताब्यात घेतल्यानंतर नासक हिरा त्यांच्या ताब्यात आला. त्यानंतर मराठ्यांनी जेव्हा आपले साम्राज्य उत्तर हिंदुस्तानापर्यंत विस्तारले, तेव्हा युद्धातून वसूल झालेल्या खंडणीद्वारे नासक हिरा मराठ्यांच्या ताब्यात आला. त्यानंतर हा हिरा त्र्यंबकेश्वरी शिवशंकराच्या मुकुटामध्ये कसा पोहोचला याची हकीकत विशेष आहे.
nasak2
त्र्यंबकेश्वर मंदिर नाशिकपासून सुमारे २८ किलोमीटर अंतरावर आहे. सध्या उभे असलेले त्र्यंबकेश्वर मंदिराचे निर्माण अठराव्या शतकामध्ये नानासाहेब पेशव्यांनी करविले होते. नासक हिरा मराठ्यांच्या ताब्यात आल्यानंतर बहुधा नानासाहेब पेशव्यांनी सोन्याच्या मुकुटामध्ये हा हिरा जडवून हा मुकुट त्र्यंबकेश्वर मंदिराला भेटीदाखल दिला असावा असा इतिहासकारांचा कयास आहे. पण या बद्दल कोणताही ऐतिहासिक दाखला उपलब्ध नसल्यामुळे याबद्दल नेमकी माहिती उपलब्ध नाही. मुकुटामध्ये जडविलेला हा हिरा १८१७ सालापर्यंत देवस्थानामध्येच राहिला. त्यानंतर असे म्हटले जाते, की दुसरे बाजीराव पेशवे यांच्या आज्ञेवरून हा हिरा मुकुटातून काढून पेशव्यांच्या संग्रही जमा केला गेला. साधारण त्याच काळादरम्यान मराठे आणि इंग्रजांमध्ये युद्ध सुरु झाले, आणि यामध्ये पेशव्यांचा पराभव झाला.
nasak3
युद्धातून पळ काढून सुमारे पाच महिने दुसरे बाजीराव पेशवे ठिकठीकाणी आश्रय शोधत होते. ब्रिटीशही सातत्याने त्यांच्या मागावर होते. या काळामध्ये नासक हिरा बाजीरावांकडे होता. १८१८ साली अखेरीस बाजीरावांनी शरणागती पत्करली आणि नासक हिरा कर्नल ब्रिग्ज यांच्या हवाली केला. ब्रिग्ज यांनी हा हिरा भारताचे तत्कालीन गव्हर्नर जनरल मार्केस ऑफ हेस्टींग्ज यांना सुपूर्त केला. त्यानंतर हा हिरा मराठ्यांकडून जप्त झालेल्या इतर मौल्यवान संपत्तीच्या सोबत इंग्लंडच्या दरबारी पाठविण्यात आला. हा हिरा लंडनमध्ये विक्रीसाठी उपलब्ध झाल्यानंतर केवळ ३००० पाउंड्स रक्कम देऊन ‘रंडेल अँड ब्रिज’ नामक हिरे व्यापाऱ्यांनी हा हिरा खरेदी केला. त्यानंतर या हिऱ्याला पुनच्श पैलू पाडून नव्या रूपातील हा हिरा ड्युक ऑफ वेस्टमिन्स्टर यांना विकण्यात आला. त्यांनी हा हिरा त्यांच्या तलवारीवर जडवून घेतला.
nasak4
१९२७ साली हा हिरा न्यूयॉर्क येथील रत्नांचे व्यापारी जॉर्ज मौबुसेन यांना विकण्यात आला. मौबुसेन यांच्याकडे असलेल्या बहुमूल्य हिऱ्याची कुणकुण लवकरच इतरांना लागताच हा हिरा मिळविण्याच्या प्रयत्नात अनेक चोऱ्या घडवून आणण्यात आल्या. १९३० साली हा हिरा चोरण्याचा पुनश्च प्रयत्न झाला, मात्र हा हिरा एका मळक्या, चुरगळलेल्या पाकिटामध्ये लपविलेला असल्याने वाचला. १९३३ साली हा हिरा शिकागो येथे ‘वर्ल्ड फेअर’ मध्ये प्रदर्शित करण्यात आला. त्यानंतर हा हिरा लेबनीझ अरबपती रॉबर्ट मौआवाद यांच्याकडे गेला, तो आजतागायत त्यांच्या संग्रही आहे. हा हिरा मूळ ज्या त्र्यंबकेश्वर मंदिरातील मुकुटामधून काढून घेण्यात आला होता, तो मुकुट दर सोमवारी संध्याकाळी चार ते पाच या वेळामध्ये दर्शनासाठी खुला करण्यात येतो. या मुकुटामध्ये जडविलेली इतर रत्ने त्यावर जशीच्या तशी असली, तरी या मुकुटाची शान असलेला नासक हिरा मात्र आज त्या मुकुटावर नाही.

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

  

 


bolbhidu.com

कोहिनुर पेक्षाही मौल्यवान 'नासिक हिरा' त्र्यंबकेश्वरच्या मंदिरातून इंग्रजांनी पळवलाय

By बोलभिडू कार्यकर्ते

कोहिनुर पेक्षाही मौल्यवान ‘नासिक हिरा’ त्र्यंबकेश्वरच्या मंदिरातून इंग्रजांनी पळवलाय

जगभरात हिऱ्यांचा एकमेव स्रोत होता तो म्हणजे भारत देश. साधारण हजारो वर्षांपासून संपूर्ण जग हिऱ्यांसाठी भारतावर अवलंबून होते. कोहिनुर, द ऑरलॉफ, द ग्रेट मुगल, सेंसी होप, फ्लोरटाइन, रिजेंट, पिटली, निजाम या व यांसारख्या असंख्य हिऱ्यांनी जगाला मोहिनी घातली.

असाच एक हिरा आहे जो कोहिनुर हिऱ्यापेक्षाही मौल्यवान असून इंग्रजांनी भारतातून पळवून इंग्लंडला नेला. त्या हिऱ्याचं नाव आहे नासिक हिरा ‘आय ऑफ गॉड शिवा’

या नासिक हिऱ्याची गोष्ट सुरु होते १८१८ सालात. पण त्या आधीचा ही इतिहास आहे या हिऱ्याला. म्हणजे मराठेशाहीच्या अस्तापासूनच नव्हे तर त्यापूर्वी ही सहाशे सातशे वर्षांपूर्वी केव्हातरी हा हिरा अस्तित्वात आला.

केव्हातरी म्हणजे पक्के साल सांगायला तो इतिहास आता काळाआड गेला आहे. इतिहासाच्या स्मृतीपटलावर त्या खाणाखुणाही आता दिसेनाशा झाल्या आहेत.

नक्की साल माहित नसले तरी हा नासिक हिरा हा १३ ते १४ व्या शतकात तेलंगाणातल्या  महबूबनगरजवळ अमरागिरी खाणीत सापडला असे म्हंटल जातं. त्यानंतर तो म्हैसूर राजाच्या खजिन्यात दाखल झाला. म्हैसूरचा खजिना हिऱ्यांनी भरलेला होता. पुढं मुघल आक्रमकांनी  म्हैसूरचा खजिना लुटला. त्यानंतर नासिक हिरा मुघलांच्या खजिन्याची शान बनला.

पुढं पेशव्यांनी दिल्लीवर ताबा मिळवल्यानंतर मुघलांचा जामदारखाना पेशव्यांच्या ताब्यात यावा म्हणून पेशव्यांचे सरदार त्रिंबक सूर्याजी प्रभू यांनी त्र्यंबकेश्वरला नवस केला होता. त्र्यंबक गड  ताब्यात आल्यावर नवसाची परतफेड म्हणून पेशव्यांनी १२ ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेल्या त्र्यंबकेश्वराला मुघलांच्या खजिन्यातला सोन्याचा रत्नजडित मुकुट आणि हिरे जडजवाहिर शिवाला अर्पण  केले.त्यावेळी नासिक हिरा त्र्यंबकेश्वरच्या खजिन्यात दाखल झालं.

नाशिकचा शिरपेच असलेल्या त्र्यंबकराजाच्या मुकुटात हा हिरा विराजमान झाल्याचे म्हंटले जाते. त्यामुळेच इंग्रजांनी नासिक हिऱ्याला शिवाचा तिसरा डोळा ‘आय ऑफ गॉड शिव’ असे म्हंटले असावे. या मुकुटात हा हिरा होता, मात्र आता त्र्यंबकेश्वराच्या मुकुट पहिला तर त्यात कुठेही हिरा बसेल अशी जागा दिसत नाही.

याचा अर्थ हा हिरा त्र्यंबकेश्वरच्या खजिन्यात नव्हता. मात्र नासिक हिरा त्र्यंबकेश्वरमध्ये म्हणजे शिवाच्या नगरीत मिळाल्याने इंग्रजांनी त्याची नोंद ‘आय ऑफ गॉड शिवा’ अशी केलेली दिसते. हा हिरा मिळण्याची दुसरी शक्यताही व्यक्त केली जाते ती म्हणजे शेवटच्या पेशव्यांच्या खजिन्यात हा मिळाला असावा. पेशव्यांच्या खजिन्याची जबाबदारी त्र्यंबकेश्वरमधील ज्या व्यक्तीकडे होती त्याच्याकडून तो इंग्रजांनी लुटला.

इंग्रजांच्या दफ्तरीनुसार त्यांनी एका व्यक्तीच्या घरातून जी संपत्ती जप्त केली त्यात हा हिरा होता. म्हणजे हा खजिना पेशव्यांचा होता आणि तो त्र्यंबकेश्वरमध्ये मिळाल्याने इंग्रजांनी बहुधा ‘आय ऑफ गॉड शिव’ अशी त्याची ओळख निर्माण केली. इंग्रजांनी हा हिरा लुटला खरा पण नासिक हिरा लुटण्याचा प्रकार मुघलांनी म्हैसूरच्या खजिना लुटल्यापासून सुरु झाला होता.

आणि इंग्रजांनी हा हिरा पळवला..

१८११ मध्ये पुण्यात ईस्ट इंडिया कंपनीचा रेसिडेंट म्हणून दाखल झालेल्या माउंटस्टुअर्ट एल्फिस्टनने मराठ्यांच्या नसा आणि बळ नेमके कशात आहे हे शोधायला सुरवात केली. सरदारांमध्ये फूट कशी पडता येईल, विश्वासू माणसांना कस नामोहरम करता येईल आणि त्याचबरोबर मराठ्यांकडे नेमकी किती संपत्ती आहे? कोठे आहे? हेही हेरण्याचं काम सुरु होत.

याचदरम्यान नाशिकमध्ये असणाऱ्या कॅप्टन ब्रिग्जच्या हाती नाशिकमध्ये एक मोठा खजिना लागला. हा खजिना होता त्रिंम्बक डेंगळे, म्हणजे दुसऱ्या बाजीरावांच्या सेनापतींचा. या खजिन्यात सोन्याचांदीचे ६५ हजारांचे दागिने मिळाले.

पुढे २९ एप्रिल १८१८ रोजी कर्नल मॅक्डोवेलने कॅप्टन ब्रिग्जला बाजीरावांचे काही लोक जंगलातून काही घेऊन जात असल्याची माहिती मिळाल्याचा निरोप दिला. मात्र ब्रिग्जने या करवाईतून आपल्याला बक्षीस मिळणार नाही म्हणून ती टाळली. त्यानंतर १ मे १८१८ रोजी एलफिन्स्टनने खासगी पत्राद्वारे नाशिकमध्ये बाजीरावाची संपत्ती असल्याची माहिती दिली.

बाजीरावांची संपत्ती राजकीय मालमत्ता होती. याप्रमाणे कॅप्टन ब्रिग्ज स्वतःच त्र्यंबकेश्वर मध्ये दाखल झाले आणि त्याने ताम्हणकारांच्या घरातून संपत्ती ताब्यात घेतली. त्यांच्या घरातून प्रचंड खजिना मिळाला. यात शुद्ध सोन्याची साधारण ४ किलो म्हणजे ३५० तोळे वजनाची शेषशायी विष्णूची प्रतिमा, कमरबंद, बांगड्या, मौल्यवान पाचू, रत्ने, सोन्याचे हार, पूजेची चांदीची भांडी, एक चौरंग इत्यादी गोष्टी होत्या.

याव्यतिरिक्त अनेक पेटारे होते, की जे खोलण्यात आले नव्हते, ज्यात एवढ्या सोन्याच्या मोहरा व रत्ने होती. ज्याची मोजदाद करणे शक्य नव्हते. इंग्रजांनी लुटलेल्या संपत्तीत ९० कॅरेटचा एक हिराही होता. हा हिरा नासिकमध्ये मिळाल्याने कॅप्टन ब्रिग्जने या हिऱ्याची नोंद करताना त्याला नासिक हिरा असे म्हंटले.

लुटीच्या या नासिक हिऱ्याची गणना १९३० मध्ये जगातल्या प्रमुख २५ हिऱ्यांमध्ये केली गेली.

ह्या हिऱ्यानं अख्खी जगभ्रमंती केली.

१६ मार्च १८२१ च्या इंग्लंडच्या वृत्तपत्रांमध्ये नासिक हिरा इंग्लंडला दाखल झाल्याचे वृत्त प्रसिद्ध झाले होते. पण नासिक हिऱ्याचा प्रवास इथेच संपला नव्हता. ३ जुलै १८३७ मध्ये जे. जी. मेसर्स अँड जी. ए. शार्प यांनी या हिऱ्याच्या लिलावाचे आयोजन केले. २० जुलै १८३७ या दिवशी लंडनच्या रुंदेल आणि ब्रिज या जोहोरींनी नासिक हिरा ३०००० पाउंडला विकत घेतला.

त्यानंतर २५ मे १८३८ मध्ये  इंग्लंडच्या राजघराण्यातल्या महत्वाची व्यक्ती असलेल्या मार्क्विस ऑफ वेस्टमिनिस्टर रोबेर्ट ग्रॉसव्हेनोर यांनी तो विकत घेतला. त्यांनी तो हिरा आपल्या तलवारीच्या मुठीत बसवला. त्यांच्या मृत्युनंतर न्यूयॉर्कच्या ३३० पार्क अव्हेन्यू वरील श्रीमंत ज्वेलरी, एम. माऊबॉसिन यांनी विकत घेतला.माऊबॉसिन हे मूळचे पॅरिसचे होते. त्यांनी तो आपल्या स्टोअर मध्ये विक्रीला ठेवला.

१९४० साली हॅरी विन्स्टन यांनी हा नासिक हिरा विकत घेऊन त्याला पुन्हा पैलू पाडले. या मधल्या काळात हा हिरा चोरीला गेला. पण विन्स्टन यांनी तो पॅरिस मधून पुन्हा मिळवला. १९७० मध्ये हा हिरा पुन्हा लिलावात मांडण्यात आल्याचे वृत्त न्यूयॉर्क टाइम्सने दिले. १६ एप्रिल १९७० रोजी न्यूयॉर्कमधील उद्योगपती एडवर्ड जे हॅन्ड यांनी आपल्या पत्नीसाठी हा हिरा ५,००,००० डॉलरला विकत घेतला. अन जगातला हा सर्वात महागडा हिरा ठरला. त्यांची पत्नी टेनिस स्टार गासी मोरन होती. त्यानंतर हा हिरा अभिनेता रिचर्ड बर्टन, सौदी राजा खालिदबीन यांच्याकडे गेला.

शेवटी २०१६ मध्ये या हिऱ्याचा प्रवास थांबला तो वर्ल्ड हिस्ट्री अर्काइव्ह येथे येऊन दाखल झाला.

हा मूळ हिरा ९० कॅरेट म्हणजे १८ ग्राम वजनाचा होता. पुढं त्याला पैलू पडले गेले. १८३७ मध्ये मिस्टर शार्प यांनी या हिऱ्याला पैलू पडले आणि त्याचे वजन ९० कॅरेटवरून ७८.६२५ कॅरेट झाले. 

विशेष म्हणजे या हिऱ्याच्या नावाची विमान आकाशात भरारी घेतात. नासिक हिऱ्याच्या प्रेमापोटी मिडलँड एअरवेजने मॅक्डोनेल डग्लसडी जी-९ या विमानाला ‘द नासिक डायमंड’ असं नाव देऊन हिऱ्याच्या आकर्षणावर मोहोर उटवली.

असं म्हणतात की, हिरा हा उत्कंठा आणि प्रेम याचा अनोखा संगम असतो. तो वारंवार लुटला गेल्याने तो शापित होतो. आणि जो माणूस हा हिरा घेतो त्याच कर्म शापित ठरत. नासिक हिऱ्याच्या बाबतीत असच काहीस घडलं असेल का?

संदर्भ-नासिक हिरा एक शोध , चेतन राजापूरकर
नासक हिरा हा १५ व्या शतकात सापडलेला ४३.३८ कॅरेटचा हिरा आहे. हा आंध्र प्रदेशातील, कोल्लूर जवळील आमरागिरी खाणीत सापडला होता. हा हिरा पैलु पाडल्यानंतर नाशिक जवळील त्र्यंबकेश्वराच्या मुकुटावर १५ व्या शतकापासुन इ.स १८१७ पर्यत होता. त्यानंतर तो ब्रिटिशांनी पेशव्यांकडून जबरीने लूटला आणि इंग्लंडला पाठवला. या हिऱ्याला जगातील ३० महान हिरे यांतील एक महत्त्वाचा हिरा एक म्हणून दर्जा देण्यात आला आणि न्यू यॉर्क शहरातील पार्के-बर्नेट गॅलरीमध्ये प्रदर्शनासाठी ठेवण्यात आला होता. सध्या हा हिरा लेबनॉनमधील एका खाजगी संग्रहालयात ठेवण्यात आला आहे. हा हिरा परत आणून भारतीय त्र्यंबकेश्वर मंदिरात स्थापन करण्याची मागणी आहे.

माझ्या समजुतीनुसार बाजीराव आणि अन्य हिंदुस्तानी राजे-महाराजे आणि नबाब ह्यांच्याकडून ब्रिटिशांनी वेळोवेळी ज्या रकमा आणि जडजवाहीर युद्धाच्या मार्गाने मिळविले त्यांचे पुढे काय झाले ह्याबद्दल आपल्याकडे स्पष्ट अशी काहीच माहिती उपलब्ध नाही. ती संपत्ति ब्रिटिशांनी 'लुटली' एवढेच आपण म्हणू शकतो. आता बुक्स.गूगल सारख्या स्थळांमुळे १८व्या-१९व्या शतकातले छापील साहित्य आपल्याला नव्याने उपलब्ध झाले आहे आणि बाजीरावच्या संपत्तीचे काय झाले ह्याचे पुष्कळसे समाधानकारक उत्तर मिळू शकते. ते वाचकांना मनोरंजक वाटेल अशी अपेक्षा आहे.
 
नासक हिरा
 

२० जुलै १८३७ ह्या दिवशी लंडनमध्ये अनेक मौल्यवान रत्ने लिलावात विकली गेली. त्यांमध्ये 'नासक' नावाचा एक हिरा आणि एकेकाळी अर्काटच्या नबाबाच्या तिजोरीत असलेले काही दागदागिने ह्यांचाहि समावेश होता. 'नासक' हिरा 'डेक्कन प्रा‍ईझ मनी'चे विश्वस्त ड्यूक ऑफ वेलिंग्टन आणि कर्नल अर्बथनॉट ह्यांच्या आज्ञेवरून विक्रीस आला होता. तो विकत घेतला मार्क्विस ऑफ वेस्टमिन्स्टर ह्यांनी. त्यांनी तो आपल्या समारंभांमध्ये वापराच्या तलवारीच्या मुठीमध्ये बसवला. ती तलवार कमरेला लटकावूनच ते नुकत्याच राज्याभिषेक झालेल्या विक्टोरिया राणीच्या वाढदिवस दरबाराला २४ मे १८३८ ह्या दिवशी उपस्थित राहिले होते. ब्रिटिश साम्राज्याच्या दूरदूरच्या कानाकोपऱ्यात अगदी ऑस्ट्रेलिया-न्यू झीलंडपर्यंतच्या वृत्तपत्रांनी ह्या हिराखरेदीची दखल घेतली.

'नासक' ह्या नावानं आजहि ओळखल्या जाणाऱ्या हिऱ्याचं हे नाव आपल्या नाशिक ह्या गावावरून पडलेलं आहे. ह्या नावामागे मराठेशाहीच्या अस्ताच्या दिवसांतले आणि कोणास फारसे माहीत नसलेले मनोरंजक तपशील दडलेले आहेत.

ह्या हिऱ्याला हे नाव का पडलं ह्याची प्रचलित कथा अशी आहे की हा हिरा कोणे एके काळी त्र्यंबकेश्वराच्या देवळाच्या संपत्तीचा भाग होता. दुसऱ्या बाजीरावानं तो तेथून आपल्या ताब्यात घेतला आणि त्याच्याकडून विजेत्या इंग्रजांनी तो मिळवला. हिऱ्याचे मूल्य वाढविण्यासाठी कोणीतरी बुद्ध्याच बनवलेली अशी ही कपोलकल्पित कथा दिसते. कसे ते पुढे पाहूच.

खडकीच्या लढा‍ईत पराभव झाल्यानंतर दुसऱ्या बाजीराव पेशव्यांनी १७ नोव्हेंबर १८१७ ह्या दिवशी पुणं सोडलं आणि पेशवे पुढं आणि इंग्रज मागं अशी शर्यत सुरू झाली. पेशवे पुण्याहून प्रथम नाशिक-खानदेशाकडं गेले. तेथून चांद्याकडं आणि अखेरीस उत्तरेकडं पेशवे सरकत असतांना अखेर सर जॉन माल्कम -महाबळेश्वरातील माल्कमपेठवाला- ह्यानं त्यांना गाठलं आणि अखेर पेशव्यांनी सत्ता सोडून बिठूरास पेन्शन घे‍ऊन राहण्याचं मान्य केलं. पेशव्यांची खाजगी मालमत्ता इंग्रजांनी लढाईतली लूट म्हणून ताब्यात घेतली.

इंग्रजांच्या वतीनं कमिशनर म्हणून पुण्यातून मा‍उंटस्ट्यु‍अर्ट एल्फिन्स्टन सूत्रं हलवीत होता. त्याला कोठूनतरी बातमी लागली की उत्तरेकडं सरकतांना पेशव्यांनी नाशिकला एका विश्वासू व्यक्तीच्या घरात काही जडजवाहिर लपवून ठेवलं आहे. बातमी कळताक्षणी त्यानं आपल्या हाताखालच्या कॅ. ब्रिग्जला हे जडजवाहिर शोधून ताब्यात घेण्याची कामगिरी सोपविली. कॅ. ब्रिग्ज लगोलग नाशिकास रवाना झाला आणि त्या व्यक्तीच्या घराचा शोध घे‍ऊन त्यानं घराची खणती केली. अपेक्षित घबाड त्याच्या हाती लागलं. हे घडलं २ मे १८१८ च्या रात्री. ह्या घटनाक्रमाला आधार आहे तो म्हणजे 'डेक्कन प्रा‍ईझ मनी' बाबतचा तत्कालीन इंग्रजी वृत्तपत्रांमधून वेळोवेळी आलेला मजकूर. कोणाच्या घरात हा ऐवज दडविण्यात आला होता हे नाव आज कळू शकत नाही.

'डेक्कन प्रा‍ईझ मनी' म्हणजे काय? तत्कालीन रिवाजानुसार परपक्षाचा पराभव झाल्यावर त्या पक्षाची जी काही दौलत विजेत्यांच्या हातात पडेल तिचे सैनिकांमध्ये वाटप करून सैनिकांना खूष ठेवण्याची पद्धत युरोपात रूढ होती. अशा लुटीमध्ये सर्वोच्च राजसत्तेपासून मोहिमेत भाग घेतलेले सर्व अधिकारी आणि सामान्य सैनिकांपर्यंत प्रत्येकाचा दर्जानुसार वाटा असे. हे वाटप कसे करायचे ह्याचेही नियम ठरलेले होते. तदनुसार किरकोळ मूल्याच्या वस्तू जागीच विकून सर्वसामान्य सैनिकांमध्ये ती रक्कम वाटत असत. अधिक मौल्यवान वस्तू, विशेषेकरून जडजवाहिर आणि हिऱ्यांसारख्या वस्तु, इंग्लंडला पाठवून तिथं त्या सरकारजमा होत आणि कालांतरानं योग्य किमतीला त्या विकून त्या रकमेचंहि वाटप होत असे. पेशवा‍ईच्या अस्तानंतर अशा प्रकारे नागपूरकर भोसले, होळकर आणि पेशवे ह्यांच्याकडून इंग्रजांनी बरीच लूट ताब्यात घेतली. त्यांपैकी मौल्यवान अशा वस्तु आणि जडजवाहिर इंग्लंडमध्ये पाठवलं. हाच 'डेक्कन प्रा‍ईझ मनी. ह्या रकमेचं व्यवस्थित वाटप व्हावं म्हणून ती ड्यूक ऑफ वेलिंग्टन आणि कर्नल अर्बथनॉट ह्यांच्या ताब्यात विश्वस्त म्हणून देण्यात आली. विश्वस्तांचं ऑफिस ८ रीजंट स्ट्रीट इथं होतं. विश्वस्तांनी आपलं काम कसं केलं ह्याचे अनेक तपशील इंग्लंडमधील तत्कालीन वृत्तपत्रांमधून वाचायला मिळतात. ड्यूक ऑफ वेलिंग्टनकडं हे काम सोपवलं जाण्याचं कारण म्हणजे त्या काळात त्यांच्या नावाचा फार मोठा दबदबा होता. नेपोलियनवर नुकताच विजय मिळवून त्यांनी आपलं इतिहासातलं स्थान पक्कं केलं होतंच. ह्याशिवाय दुसऱ्या इंग्रज-मराठा युद्धात त्यांचा महाराष्ट्राशी चांगलाच परिचय झालेला होता.

थोडक्यात म्हणजे मराठ्यांच्याबरोबरच्या अखेरच्या लढा‍ईत इंग्रजांच्या हातात एक खूप मोठी रक्कम आली आणि तिचं वाटप करण्यासाठी तिच्यातला महत्त्वाचा भाग इंग्लंडमध्ये पोहोचला. लुटीतल्या बऱ्याच गोष्टी जागीच विकून रकमेचं वाटप केलं होतं. निवडक निवडक वस्तु ज्या इंग्लंडला गेल्या त्यांमध्ये 'नासक' हिराहि होत. १६ मार्च १८२१ च्या एका वृत्तपत्रात असं नाव दिलेला एक मोठा हिरा इंग्लंडात ये‍ऊन पोहोचल्याचा उल्लेख मिळतो. ह्या उल्लेखावरून असं वाटतं की हिरा नाशिकला मिळाला म्हणूनच त्याला 'Nassuck' हे नाव मिळालं. इथं हे लक्षात घ्यायला हवं की तेव्हांच्या सर्व इंग्रजी लिखाणात नाशिकचा उल्लेख Nassuck असाच केलेला आढळतो. ह्या सर्व खजिन्याची योग्य ती विल्हेवाट लावण्यासाठी विश्वस्तांना बरीच वर्षं मेहनत घ्यावी लागली. पुढची पंधरा‍एक वर्षं तरी हे काम चालू असल्याचं दिसतं.

एव्हढा वेळ लागायचं कारण असं की प्रत्यक्ष लूट घेतांना जागेवर असलेले आणि जागी नसलेले तरी ज्यांचं लुटीमध्ये योगदान होतं अशा दोन्ही गटांना वाटा घेण्याचा अधिकार होता पण कोणाचा किती वाटा ह्याबद्दल बरेच मतभेद होते. एकूण मोहिमेचा प्रमुख जनरल हिस्लॉप आणि त्याचा राजकीय वरिष्ठ कलकत्तेकर गवर्नर-जनरल मार्क्विस ऑफ हेस्टिंग्ज ह्या दोघांमध्ये बरेच मतभेद होते. हिस्लॉपची तक्रार होती की आपल्या मागणीकडं पाहण्याचा ड्यूक ऑफ वेलिंग्टनचा दृष्टिकोण उपेक्षेचा आणि तुच्छतेचा आहे. नाशिकच्या खणतीच्या दिवसातला तिथं उपस्थित असलेला अधिकारी कर्नल मॅकडॉवेलची तक्रार होती की पुण्याहून आलेल्या ब्रिग्जनं त्याला अंधारात ठे‍ऊनच आपला कार्यभाग साधला आणि त्याला न्याय्य हिश्श्यापासून वंचित ठेवलं. अशा एक ना दोन अनेक वादांमुळं हे प्रकरण पुढं पंधरा‍एक वर्षं खदखदत होतं. वृत्तपत्रांमधून आणि पार्लमेंटात अनेकदा त्यावर प्रश्न विचारले गेले. अखेरीस १८३६-३७ साली प्रकरण अखेरीस मार्गी लागलं आणि 'नासक' हिरा विकायला बाहेर आला.

अशी अनेक वादांच्या भोवऱ्यात सापडलेली रक्कमहि तशीच जबरदस्त असली पाहिजे. एका ठिकाणी उपलब्ध असलेल्या माहितीनुसार ती ७२ लाख रुपये इतकी होती. त्यावेळेस सोन्याचा भाव १८-१९ रुपये तोळा होता असं धरलं तर आजच्या किमतीनं ह्या लुटीची किंमत ६-७ अब्जाच्या घरात जाते. हे जरा ढोबळच अनुमान आहे पण रक्कम खूपच मोठी होती एवढं कळायला पुरेसं आहे.

आणखी एका वादाचा इथं उल्लेख करायला हवा. सिंहगड किल्ला २ मार्च १८१८ ह्या दिवशी पाडाव झाला आणि मराठ्यांनी किल्ला खाली केला. त्यावेळी ठरलेल्या अटींनुसार किल्ल्यातील लोकांना केवळ आपापले वैयक्तिक सामान बाहेर काढण्याची अनुमति देण्यात आली होती. नारो गोविंद औटी नावाचा बाजीरावाचा विश्वासू किल्ल्यात होता आणि तो बाहेर पडताना त्याच्याजवळ सोन्याच्या नाण्यांनी भरलेले चार पेटारे होते. ह्या नारो गोविंदाचा सर्व इंग्रजी लिखाणामध्ये केलेला उल्लेख Narroba Govind Outia असा आहे. नारो गोविंदच्या दाव्यानुसार ती सुमारे ३६ लाखाची मालमत्ता त्याची खाजगीतली होती. इंग्रजांना शंका होती की मालमत्ता बाजीरावाची असली पाहिजे आणि तसं असलं तर तिच्यावर विजेते म्हणून त्यांचा अधिकार होता. ती त्या जागी जप्त केली गेली पण नारो गोविंद आणि इंग्रजांच्यातील हा वाद बरेच वर्षं चालू रहिला. मध्यन्तरी केव्हातरी नारो गोविंदाचा मृत्यु झाला पण त्याच्या वतीनं दोघा मारवाडी व्यक्तींनी दावा पुढं चालू ठेवला. हा दावा त्यांनी रोख पैसे दे‍ऊन बहुधा नारो गोविंदाच्या पुढच्या पिढ्यांपासून विकत घेतला असला पाहिजे. आश्चर्याची गोष्ट अशी की मुंब‍ईच्या सुप्रीम कोर्टात निर्णय नारो गोविंदाच्या बाजूनं लागला. त्या निर्णयाविरुद्ध कंपनी सरकारनं लंडनला प्रिव्ही कौन्सिलमध्ये अपील दाखल केलं. ह्या अपीलाचा निर्णय लागेपर्यंत डेक्कन प्रा‍ईझ मनीचं वाटप केलं जा‍ऊ नये अशी पार्लमेंटात मागणी आली आणि त्यानुसार वाटप थांबवून ठेवण्यात आलं. प्रिव्ही कौन्सिलचा हा निर्णय कंपनीच्या अपीलाच्या बाजूनं लागला पण हे होता होता १८३० साल उजाडलं. हा निर्णय वाचायला उपलब्ध आहे.

'नासक' हिऱ्याचं पुढं काय झालं? अक्रोडाच्या आकाराच्या ह्या हिऱ्याचं वजन ८९ कॅरटहून थोडं अधिक होतं. त्याचं तेज वाढविण्याच्या हेतूनं त्याला नंतर दोनदा पैलू पाडण्यात आले. हिरा मार्क्विस ऑफ वेस्टमिन्स्टरच्या पुढील पिढ्यांच्या ताब्यात पुढची सत्तर‍एक वर्षं होता. तदनंतर तो तीनचार वेळा युरोप-अमेरिकेत विकला गेला आणि सध्या तो एका धनाढ्य अमेरिकनाच्या मालकीचा आहे. ही शेवटची विक्री १९७० मध्ये झाली. आजची त्याची किंमत सुमारे ३० लाख अमेरिकन डॉलर्स असावी असा तर्क केला जातो. मराठेशाहीचा असा एक अवशेष एका अमेरिकेतल्या तिजोरीत बंद आहे. काळाचा चमत्कार - दुसरं काय?

इतिहासलेख

प्रतिक्रिया

हा लेख जुलै ११, २०११ ह्या दिवशी मी प्रथम 'उपक्रम' ह्या सध्या वाचनमात्र असलेल्या संस्थळावर येथे प्रकाशित केला होता. ही माहिती वर नोंदविण्याचे राहून गेले ते काम आता करत आहे.

रोचक माहिती. भारताचे आर्थिक आणि ऐतिहासिक महत्व असलेले किती मोठे खजिने इंग्रजांनी लुटले असतील याची पूर्ण कल्पनाही करणे शक्य नाही. :(

तुमचे लेखं अभ्यासपूर्वक , सचित्र व आटोपशीर असतात.
कृपया तुमचे लेखं तुम्ही एखादी सिग्नेचर वैगरे टाकून, सुरक्षित करा.

सुरेख. माहितीपूर्ण लेखन आवडले.

-दिलीप बिरुटे

रोचक माहिती...

अतिशय रोचक उत्कृष्ट लेख.

एक प्रश्न पडतो की असे दुर्मिळ महाग आणि नंतर जगप्रसिद्ध झालेले हिरे, पाचू, माणकं, रत्नं हे मुळात पेशवे किंवा भारतीय राजेमहाराजे यांच्याकडे कसं आलं? उदा. हाच नासक हिरा.

भारतात हिऱ्याच्या खाणी होत्या म्हणून ?

गवि, १७२६ सालापर्यंत भारत हा हिऱ्यांचा एकमेव मोठा सोर्स होता. जगात दुसरीकडे कुठेच हिऱ्यांच्या खाणी नव्हत्या. ब्रासिल आणि साऊथ आफ्रिका इथे खाणी नंतर सुरु झाल्या. दक्षिण भारतात गोवळकोंड्याच्या राज्यात खाणी असल्यामुळे जगभरचे व्यापारी भारतातून हिरे विकत घेत. तुम्ही तावर्निए अथवा बर्नियर यांचे नाव ऐकले असेल. ते भारतात हिऱ्यांच्या शोधात आले होते. गोवळकोंड्याचा राज्याची जी खंडणी मोगलांना जात असे त्यात हिरे असत.

जहांगीर बादशाहने आपल्या डायरीत आपल्या मुलात कोणते गुण आहेत ते लिहिले आहे - त्याचा मुलगा बाबा खुर्रम (म्हणजे शहाजहान) याला हिऱ्यांची उत्तम पारख होती. (ती डायरी मोठी मजेशीर आहे पण तो वेगळा विषय आहे) असा हिऱ्यांचा खजिना अकबर, जहांगीर आणि शहाजहान यांनी सतत १०० वर्षे जमवला होता. औरंगजेबाला जमवण्यात काही रस नव्हता पण त्याने आहे तो जपून ठेवला. मग १७३९ साली नादिरशाहने सगळी रत्ने लुटली. ती शीख, इराणी, रशियन, अफगाण आणि आता कतार, कुवेत इथेही सापडतात. काही पाचूंवर आपल्याला या सगळ्या मालकांची नवे कोरलेली सापडतात (अकबर - जहांगीर - शहाजहान - औरंगझेब - नादीर शाह अफसर - अहमद शाह अब्दाली) त्यातून आपल्याला हा इतिहास कळतो. एक लेख टाकेन निवांत कधी तरी यावर.

आज जसे लोक गुंतवणूक म्हणून सोने अथवा जमीन घेतात तसा हिरे हा मातबर लोकांसाठी एक गुंतवणुकीचा मार्ग होता आणि स्वतःचा मोठेपणा दाखवण्याचा मार्ग देखील. मराठ्यांनी निझामाला नमवून बऱ्याचदा खंडणी घेतली. इतरही प्रांतात दरवर्षी चौथाई वसूल केली. त्यामुळे त्यांच्याकडे १०० वर्षांच्या राजवटीत पैसे आणि हिरे जमलेच होते. पुष्कळदा सैनिकी खर्च वारेमाप होई आणि उत्पन्न पुरे पडत नसल्यामुळे कर्ज घायची वेळ येई ती गोष्ट वेगळी, पण खेळते भांडवल बरेच होते.

हे राहिलेच टाकायचे.

अगदी आजही भारताच्या एक्सपोर्ट मध्ये हिऱ्यांच्या मला वाटते १०% वाटा आहे. सुरत हे जगातले मोठे हिऱ्यांचे केंद्र आहे - त्यामागे हा इतिहास आहे. कित्येक पिढ्यांपासून सुरतमध्ये हे काम होते.

भारताच्या सध्याच्या हिऱ्यांच्या एक्सपोर्टमधला बराच भाग re-exportचा आहे. Rough Diamonds वेगवेगळ्या देशातून भारतात आयत झाल्यावर सुरतेत त्याना पैलू पाडले जातात.

खूप आभार. आणखीनच रोचक माहिती दिलीत. आता त्या जहांगीरच्या डायरीबद्दल माहिती मिळवली पाहिजे.

या विषयावर आणखी लेखनाच्या प्रतीक्षेत आहे.

अवश्य. लगेच वाचतो.

बादवे त्या खाणींवरुन आठवलं. आता भारतातल्या त्या खाणी आटल्या का? नवीन सापडल्या नाहीत का? (गोवळकोंडा हे नाव एका ब्रैंडीमुळे लोकांत टिकून राहिलंय ते माहीत आहे) ;-)

खाणी संपल्या, गेले ते हिरे, आता राहिले फक्त दगड (आणि ब्रांडी !!!) ☺️

कुतुबशाही राज्यांची राजधानी गोलकुंडा किल्लयाच्या पायथ्याशी असलेल्या बाजारपेठेत हिऱ्याची विक्री होत असे. पण तेथे हिरे सापडत नसत. तेथून जवळ वाहणाऱ्या कृष्णा आणि पालार या नद्यात वाहत येणाऱ्या वाळूतून पॅनिंग करून ते निवडले जात . गोलकुंडा अथवा त्या जवळपास कुठेही हिऱ्याच्या 'खाणी' नव्हत्या..

पन्ना येथे हिऱ्यांची खाण होती. सध्या ती बंद आहे असे वाटते. सेम विथ कोलार सोन्याची खाण.

किंबरलाईट नावाचा एक अश्मांचा प्रकार आहे. त्यात हिरे नैसर्गिकरीत्या असू शकतात. अशा दगडामध्ये हिऱ्या खाणी असतात. पन्ना जवळ माझगाव येथे अशा प्रकारचे दगड आहेत. कृष्णा व पलार या नद्यांच्या उगमा पर्यंतच्या भागा पर्यंत हे दगड असायला पाहिजेत. पण अजून पर्यंत सापडलेलेले नाहीत . फार पुरातन असल्याने त्यांची खूप झीज झाली असणार. दगडांची वाळू झाल्यावर ती वाळू आणि तिच्याबरोबर न झिजणारे खडे ( हिरे ) नदीच्या पात्रात वाहत जात असले पाहिजेत.

मूळ लेख तर भन्नाट आहेच पण यात देखील मजा आली,
इतिहास सांगणारा लेख लवकर आणा.

प्रतीक्षेत आहोत

सुंदर .... भरपूर लिहा.

सुन्दर महितीपूर्ण लेख. पेशव्यान्च्या उत्तरेतल्या मोहिमा कर्ज काढूनच झाल्या होत्या. सदाशिवरावभाऊ पानपतावर जो काही ऐवज घेऊन गेले तो परत आला नाही. राघोबादादा, नानासाहेब पेशवे यान्च्या "छन्दात" काही जड जवाहिर वापरले गेले असेलच. "नासक" सारख्या अनेक कथा लिहिण्यासारख्या असाव्यात!!

हरल्यास जवळचे सारे धन शत्रूकडून लूट म्हणून जप्त होत असल्याची पद्धत होती तर मग हे कर्ज देणं ही मुळात फारच मोठी रिस्क असणार. कोण होते हे जिगरबाज बाजीगर सावकार ? की त्यांनाही कर्ज न देण्याचा चॉइस नव्हताच?

राजाचाच मल्ल्या झाल्यास ते दाद कुणाकडे मागत असावेत? रिकव्हरी अवघडच असणार.

manguu@mail.com's picture

30 Jan 2018 - 8:52 am | manguu@mail.com

लॉटरीसारखे असेल.

म्हणजे असे धनको भरपूर लोकाना कर्जे देत असतील. कुणाचे परत येतील , कुणाचे जातील.

नाही गवि, व्याज जबरदस्त असे, रिस्क जास्त म्हणजे रिवार्डस पण जास्त होते. काही सावकार फौजबंद असत. पेशव्याचे सावकार बाबूजी नाईक बारामतीकर. त्यांची मुलगी काशीबाई बाजीरावाची बायको. बारामतीकरांचे थेट छत्रपतींशी कॉन्टॅक्टस होते. त्यांचा वडगाव काशिंबेग इथे मोठा वाडा आणि मंदिरही आहे.

पटवर्धन हे सुदधा पेशव्याचे सावकार. मिरजेच्या किल्ला आणि ठाणें त्यांच्या ताब्यात होते. सामान्य माणसाने पडण्याचा तो धंदा नव्हता.

शिवाजी महाराजांनी सुरतेत लुटले ते मोठे सावकारच. बहरजी बोहरा आणि विरजी व्होरा. शांतीदास या सावकाराचे लागेबांधे पार शहाजहान बादशहपर्यंत होते - शहजादा औरंगझेब याविरुद्ध तक्रार करण्याची हिंमत आणि ताकद शांतीदास सावकाराकडे होती.

राज्य बदललं तर जुन्या राज्याची कर्जे नवीन राजवटीवर लागू नसत. बापाचे कर्ज मुलाला द्यावे लागे. पण नवीन शाखा जसे दुसऱ्या बाजीरावाचे राज्य चालू झाले तेंव्हा त्याला आपल्या पूर्वीचे म्हणजे सवाई माधवरावाच्या काळचे कर्ज द्यावे लागले नाही.

मरते समयी थोरला माधवराव याला चिंता होती कर्जाची. कर्जे फेडू अशी जबाबदारी इतरांनी घेतल्यावरच त्याने प्राण सोडले. तसेच नाना फडणीसाच्या मृत्यूनंतर अरब शिपायांची थकबाकी ही दुल्लभशेठ या सावकाराने घेतली.

सावकारीसंबंधी हे काही विस्कळीत किस्से. माझ्या आठवणीतून लिहितो आहे त्यामुळे थोडेफार तपशील चुकलेले असतील, पण तुम्हाला एकूण अंदाज येईल. लिहून टाका एखादी फर्मास कथा याच्यावर ☺️☺️☺️

अप्रतिम लेख.
कॅप्टन ब्रिग्ग्स उल्लेखावरुन आठवले की ह्याच कॅ. ब्रिग्ग्सने १८१८ साली नाशिकमधील काही किल्ले पायर्‍यामार्ग फोडून उद्ध्वस्त केले. मात्र तो त्र्यंबकेश्वजवळील हरिहर किल्ला जिंकण्यासाठी आला असता त्याला हरिहरच्या आभाळात घुसलेल्या पायर्‍यांनी इतके प्रभावित केले की त्याने हा पायरीमार्ग उद्ध्वस्त केलाच नाही. आजही इकडील बहुतेक किल्ल्यांचे पायरीमार्ग उद्द्वस्त झाले असता हरिहरच्या देखण्या पायर्‍या आजही पाहता येतात.

ss_sameer's picture

30 Jan 2018 - 10:56 am | ss_sameer

रस्ता कसा आहे किल्ल्यापर्यंत?
कसे जावे लागेल?

त्र्यंबकेश्वर हर्षवाडी किंवा त्रयंबकेश्वर निरगुडपाडा.
हर्षवाडी मार्गे थोडं जवळ पडेल. पायर्‍यांपर्यंत रस्ता सोपा आहे. पायरीमार्ग मात्र काहीसा कठीण आहे.

रोचक माहिती.
हरिहरच्या किल्ल्याला जावे लागेल लवकरच पायर्‍या बघायला.

पैसा's picture

30 Jan 2018 - 10:22 am | पैसा

सगळे वाचताना उदास वाटते. लढून झगडून माणसे मरून गेली. हिरे मात्र एका तिजोरीतून दुसरीत फिरत राहिले.

@ पैसा, अगदी असेच वाटले मला ही :-(

तिमा's picture

31 Jan 2018 - 3:23 am | तिमा

लढून झगडून माणसे मरून गेली. हिरे मात्र एका तिजोरीतून दुसरीत फिरत राहिले.
हे अटळच आहे. हिरा कधी नाश पावत नाही. तो ज्याच्याकडे असतो त्याला मात्र, आपणच त्याचे कोंदण आहोत असं वाटत असतं. कोंदण नाशवंतच असतं.

लेख आणि प्रतिसाद दोन्ही रोचक, विशेषतः मनो यांचे, सावकारी व्यवसायाबद्दलचे.
राजकीय इतिहासात सामाजिक इतिहास झाकोळला जातो. त्यामुळे वेगवेगळ्या कालखंडात 'समाज' कसा होता, काय करत होता ह्याबद्दल माहिती परोक्ष आणि कमी असते.

अतिशय सुंदर आणि माहितीपूर्ण लेख! कोल्हटकर, मनो - मनःपूर्वक आभार. लेखमाला आली तर काय मज्जा येईल!

सुंदर आणि माहितीपूर्ण लेख
आवडला

छान माहितीपूर्ण लेख. प्रतिसादांमधूनही सुरेख माहिती मिळाली.

आणि "मनो" ह्यांचा प्रतिसाद पण आवडला....

पेशव्यान्चे आणखी दोन सावकार - वर्तक आणि अनगळ यान्च्या जमिनी (आणि नन्तर त्यावर बान्धलेल्या इमारती) अजुनही पुण्यात आहेत. जबर व्याजाखेरीज हे सावकार आपल्या वजनाचा उपयोग करून थोडक्या किमतीत "सरकारी" फायदे मिळवण्याचाही उद्योग करत असावेत.










 
नाशिक शहराचे निर्माण व ऐतिहासिक महत्त्व
नाशिक हे महाराष्ट्रातील एक महत्त्वाचे शहर असून, त्याला ऐतिहासिक, धार्मिक, सांस्कृतिक, आणि आर्थिक दृष्टिकोनातून मोठे स्थान प्राप्त आहे. गोदावरी नदीच्या काठावर वसलेले हे शहर त्याच्या पुरातन वारशासाठी, कुम्भमेळ्यासाठी आणि आधुनिक औद्योगिक विकासासाठी प्रसिद्ध आहे. नाशिकच्या इतिहासाचा मागोवा घेतल्यास आपल्याला त्याचे महत्त्व पुरातन काळापासून ते आधुनिक काळापर्यंत सतत वाढत गेले असल्याचे दिसते.
१. नाशिकचे प्राचीन व धार्मिक महत्त्व
नाशिकचा इतिहास रामायण काळाशी जोडलेला आहे. भगवान राम, माता सीता, आणि लक्ष्मण यांनी अयोध्येहून वनवासात येऊन नाशिकमध्ये पंचवटी या ठिकाणी वास्तव्य केले होते, अशी मान्यता आहे.
पंचवटी: पंचवटी म्हणजे पाच वटवृक्षांचा प्रदेश. येथे रामकुंड, सीता गुफा, आणि काळाराम मंदिर यांसारखी ठिकाणे धार्मिकदृष्ट्या महत्त्वाची आहेत.
रामकुंड: गोदावरी नदीच्या काठावर वसलेले रामकुंड हे हिंदूंचे पवित्र तीर्थस्थान आहे. येथे मृतात्म्यांच्या शांतीसाठी विधी केले जातात.
कुंभमेळा: दर १२ वर्षांनी नाशिकमध्ये कुंभमेळा भरतो. हा मेळा धार्मिक आणि सांस्कृतिकदृष्ट्या संपूर्ण भारतासाठी महत्त्वाचा मानला जातो.
२. ऐतिहासिक महत्त्व
नाशिकचा प्राचीन व मध्यमकालीन इतिहास खूप समृद्ध आहे. येथे विविध राजवटींचा प्रभाव दिसून येतो.
सातवाहन काळ: सातवाहन राजवंशाच्या काळात नाशिकचे महत्त्व वाढले. त्र्यंबकेश्वर भाग सातवाहनांच्या नियंत्रणाखाली होता, आणि त्यांनी बौद्ध धर्माला प्रोत्साहन दिले.
पांडव लेणी: नाशिकमधील पांडव लेणी ही भारतातील सर्वात प्राचीन शिल्पकलेच्या उदाहरणांपैकी एक आहे.
मुघल काळ: मुघल साम्राज्याच्या काळात नाशिकचे नाव "गुलशनाबाद" होते. मुघल बादशहांनी येथे बागा, किल्ले आणि ऐतिहासिक वास्तू बांधल्या.
मराठा काळ: मराठा साम्राज्याच्या प्रभावामुळे नाशिकचे महत्त्व राजकीय आणि सांस्कृतिक दृष्टिकोनातून आणखीनच वाढले. पेशव्यांनी नाशिकचा विकास केला.
ब्रिटिश काळ: ब्रिटिश काळात नाशिकला व्यापार केंद्र म्हणून महत्त्व प्राप्त झाले.
३. नाशिकचे भौगोलिक स्थान व महत्त्व
नाशिकचे स्थान सह्याद्री पर्वतरांगांच्या कुशीत, गोदावरी नदीच्या काठावर आहे.
गोदावरी नदी: ही नदी दक्षिण भारतातील जीवनवाहिनी मानली जाते. नाशिकपासून तिचा प्रवास सुरू होतो.
त्र्यंबकेश्वर: गोदावरीचे उगमस्थान असलेले त्र्यंबकेश्वर हे शिवशंकराचे बारावे ज्योतिर्लिंग आहे.
शेती व नैसर्गिक साधनसंपत्ती: नाशिकचा परिसर शेतीसाठी समृद्ध असून, द्राक्ष, कांदा, डाळी, आणि तांदूळ उत्पादनासाठी प्रसिद्ध आहे.
४. नाशिकचे आधुनिक महत्त्व
औद्योगिक विकास: नाशिकमध्ये विविध औद्योगिक क्षेत्रे उभारली गेली आहेत. अंबड आणि सिन्नर येथील औद्योगिक वसाहतींमुळे नाशिक महाराष्ट्रातील एक महत्त्वाचे औद्योगिक केंद्र बनले आहे.
द्राक्षनगरी: नाशिकला "द्राक्षनगरी" म्हणून ओळखले जाते. भारतातील वाईन निर्मितीमध्ये नाशिक आघाडीवर आहे.
शैक्षणिक केंद्र: नाशिकमध्ये अनेक महत्त्वाच्या शैक्षणिक संस्था आहेत, ज्या विज्ञान, तंत्रज्ञान, आणि व्यवस्थापन या क्षेत्रांत अग्रस्थानी आहेत.
पर्यटन: नाशिक हे धार्मिक पर्यटनाचे महत्त्वाचे केंद्र आहे. तसेच, अंजनेरी, सप्तश्रृंगी, आणि बंडारदरा यांसारख्या ठिकाणी नैसर्गिक सौंदर्याचे दर्शन घडते.
५. सांस्कृतिक व सामाजिक महत्त्व
नाशिक हे महाराष्ट्राच्या सांस्कृतिक आणि सामाजिक जीवनात महत्त्वाचे स्थान राखते.
लोककला व संगीत: नाशिक बॅंड हा नाशिकचा विशिष्ट ओळख बनला आहे.
उत्सव व सण: कुंभमेळ्यासह गणेशोत्सव, दिवाळी, आणि नवरात्र हे सण मोठ्या उत्साहात साजरे होतात.
सामाजिक सुधारणा: नाशिकमध्ये स्वातंत्र्यलढ्याच्या काळात अनेक क्रांतिकारकांनी काम केले. विनायक सावरकर आणि अनंत कान्हेरे यांसारख्या क्रांतिकारकांनी येथे स्वातंत्र्यासाठी संघर्ष केला.
६. नाशिकचा वारसा जपण्याचे प्रयत्न
ऐतिहासिक वास्तूंचे जतन: नाशिकमधील पांडव लेणी, काळाराम मंदिर, आणि इतर वारसास्थळांचे जतन करण्याचे प्रयत्न सुरू आहेत.
गोदावरी स्वच्छता अभियान: गोदावरी नदीला स्वच्छ ठेवण्यासाठी विविध मोहिमा राबविल्या जात आहेत.
७. नाशिकचे भावी महत्त्व
नाशिक हे स्मार्ट सिटी प्रकल्पांतर्गत विकसित होत आहे. माहिती तंत्रज्ञान, औद्योगिक विस्तार, आणि पर्यटन क्षेत्रात होणाऱ्या वाढीमुळे नाशिकची प्रगती आगामी काळातही वाढतच राहील.
निष्कर्ष
नाशिक हे प्राचीन इतिहास, धार्मिक महत्त्व, भौगोलिक वैशिष्ट्ये, आणि आधुनिक विकासाचे संगमस्थळ आहे. रामायण काळापासून आधुनिक काळापर्यंत, नाशिकने भारताच्या सांस्कृतिक, आर्थिक, आणि सामाजिक प्रगतीत आपले योगदान दिले आहे. नाशिकची ही अनमोल ओळख जपत त्याचा वारसा आणि भविष्य उज्ज्वल करण्यासाठी प्रयत्न करणे हे आपले कर्तव्य आहे.
कैलास सोनवणे, धुळे
 
 
 

नावाची व्युत्पत्ती

शहराच्या नावाचा उगम रामायण या महाकाव्याशी जोडला जातो. या महाकाव्यानुसार लक्ष्मणाने रावणाची बहीण शूर्पणखा हिचे नाक कापले होते किंवा कापले आहे. त्यामुळे या जागेचे किंवा या गावाचे नाव 'नाशिक' असे पडले आहे किंवा पाडले गेले आहे. तसेच महाराष्ट्र सरकारने ते बदलून नाशिक केले आहे.नाशिक आणि पंचवटी या दोन भागांतून जी गोदावरी नदी वाहते ती नऊ टेकड्यांच्या मधून वाहते म्हणनु त्यास "नव शिखां"असे म्हणतात.शिखा या संस्कृत शब्दाचा अर्थ टेकडी असा होतो. त्यावरून 'नव शिखा' नगरी वरून नाशिक असे नाव झाले. नाशिक या शहराला प्राचीन आणि पौराणिक अशी परंपरा लाभलेली आहे. प्राचीन संस्कृतीचे केंद्र एक धर्मपीठ म्हणून या शहराला वेगळी ओळख आहे. बौद्ध लेणी व जैन लेणी याच शहराच्या परिसरामध्ये आहे. नाशिकपासून जवळच २८ किलोमीटर अंतरावर त्र्यंबकेश्वर हे प्रसिद्ध ज्योतिर्लिंग आहे. या भागाला वेगळी धार्मिक परंपरा लाभलेली आहे.

पुरातन काळापासून नाशिक शहर व त्या आसपासचा परिसर विविध नावांनी ओळखला जात असे. 'जनस्थान, त्रिकंटक, गुलशनाबाद', नासिक, आणि विद्यमान नाशिक' अशी पाच नावे या परिसरास होती असे उल्लेख आढळतात. ऐतिहासिक काळापासून नाशिक धार्मिक स्थळ मानले गेले आहे. रामायणात नाशिक परिसरातील 'पंचवटी' येथे श्रीराम वास्तव्यास होते, असा उल्लेख आहे. महाकवी कालिदासभवभूती यांनी त्यांच्या लेखनात नाशिकबद्दल आदराचे उद्गार काढले आहेत. मोगल साम्राज्याच्या काळात नाशिक 'गुलाबांचे शहर' म्हणून 'गुलशनाबाद' या नावाने ज्ञात होते. या शहराला "नाशिक" हे नाव कसे पडले या बाबत दोन मान्यता आहेत. "नऊ शिखरांचे शहर" म्हणून "नवशिख" आणि नंतर अपभ्रंश होऊन नाशिक असा एक मतप्रवाह आहे. तसेच दुसरा संदर्भ रामायणाशी आहे. राम, त्यांची पत्नी सीता आणि बंधु लक्ष्मण नाशिक मधील पंचवटी परिसरात वास्तव्यास असताना शूर्पणखा या रावणाच्या बहिणीचे नाक (संस्कृत भाषेमध्ये 'नासिका') लक्षमणाने या ठिकाणी कापले. त्यावरून नासिक अथवा नाशिक, हे नाव पडले असेही म्हणतात. हा मतप्रवाह अधिक प्रचलित आहे. नासिकचा डोंगर ही सह्याद्रीच्या नासिकासदृश आहे म्हणूनही नासिक हे नाव पडले असावे, अशी दाट शक्यता आहे.

भारतातल्या चार कुंभमेळ्यांपैकी सिंहस्थ कुंभमेळ्याचे क्षेत्र नाशिक आहे. दर १२ वर्षांनी येथे कुंभमेळा भरतो. येथील मंदिरे व गोदावरी नदीवरील घाट प्रसिद्ध आहेत. इ.स. १२०० सालाच्या सुमारास खोदलेली त्रिरश्मी लेणी आहेत. गोदावरी नदीला नाशकात दक्षिण गंगा म्हणतात.

ऐतिहासिक कालखंड

नाशिकचा प्राचीन इतिहास (राजकीय)

नाशिक परिसराला दक्षिण भारतातील आर्यसंस्कृती प्रचारातील आरंभस्तंभ मानले जाते. गौतम ऋषींनी ज्यावेळेस गोदावरीचा शास्त्रशुद्ध अभ्यास केला, त्यावेळेस ते येथील रहिवासी होते. सातवाहन साम्राज्य |सातवाहन] काळात नाशिकला फार महत्त्व होते. इ.स. १५० मध्ये भारतात आलेल्या टॉलेमी या इजिप्शियन प्रवाशाने नाशिक धर्मपीठ असल्याचा उल्लेख केला आहे. इसवी सनाच्या दुसऱ्या शतकाच्या पूर्वार्धात सातवाहन व शत्रप यांच्यात संघर्ष झाला. तो गौतमीपुत्र सातकर्णीच्या काळापर्यंत चालू होता.

१ इ.स.१०५-१०६ च्या दरम्यान नहपान या क्षत्रपाने सातवाहन राज्यकर्त्यांना हुसकावून लावले.

२ इ.स १२४-१२५ च्या दरम्यान नहपानाचा पराभव करून त्याचा समूळ नाश केला.नहपानाच्या काळात गोवर्धन हे जिल्ह्याचे मुख्य ठिकाण होते.

३ इ.स ४५-४६ च्या काळात शक-सातवाहन यांच्यात संघर्ष झाला.

४ इ.स ८०-१२५ हा क्षत्रप वर्चस्वाचा कालखंड होता. त्याचप्रमाणे

५ इ.स.१२५-२०० हा कालखंड सातवाहनांचा होता. याच वेळेस आभीर राजवटीने वर्चस्व गाजवलेले दिसते. आभीर हे या प्रदेशातील गवळी होते. अंजनेरी ही त्यावेळची राजधानी होती. प्रारंभी ती क्षत्रपांची होती.

६ इ.स.३२१ ते ३८४ पर्यंत मौर्य साम्राज्याचे या भागावर वर्चस्व होते. त्यानंतर आभिरांच्या हाती सत्ता गेली.

सहाव्या शतकाच्या प्रारंभी चालुक्यांनी हा प्रदेश हस्तगत केला. त्यानंतर राठोडांची सत्ता आली. त्यांनी नाशिक जिल्ह्यातील मयुरखंडीला नाशिकची राजधानी बनविले. नवव्या व दहाव्या शतकापर्यंत हा प्रदेश राष्ट्रकुटांच्या अधिपत्याखाली होता. यादव वंशाच्या राज्य स्थापनेनंतर त्यांनी देवगिरी किल्ला ही राजधानी केली. ७ इ.स १३१८ पर्यंत यादव सत्तेवर होते. ८ इ.स. १५३० मध्ये नाशिक बहामनी सुलतानाच्या ताब्यात गेले आहे. सोळाव्या शतकापर्यंत हा भाग अहमदनगरच्या निजामशाहीच्या अधिपत्याखाली होता. सतराव्या शतकात हा भाग मोगल राजवटीत होता. मोगलांनी नाशिकचे नाव बदलून गुलशनाबाद केले व ते सुभ्याचे मुख्य ठिकाण ठेवले. ९ इ.स.१७४७ मध्ये नाशिक प्रदेश पूर्णपणे मराठ्यांच्या हातात गेला आहे. १० इ.स.१८१५ ते १८१७ च्या काळात इंग्रजांनी आपले साम्राज्य प्रस्थापित केले.[]

सातवाहन राजवंश १) सिमुक राजवंश. २) कृष्ण राजवंश. ३) सातकर्णी १ राजवंश. ४) वेदश्री राजवंश. ५) शक्तीश्री राजवंश. ६) पूर्णोत्संग राजवंश. ७) स्कन्द्स्भि राजवंश. ८) २रा सातकर्ण राजवंश. ९) लंबोदर राजवंश. १०) आपीलक राजवंश. ११) मेघस्वाती राजवंश. १२) स्वाती राजवंश. १३) स्कन्द्स्वति राजवंश. १४) मृगेंद्र राजवंश. १५) कुंतल राजवंश. १६) स्वतीवर्ण राजवंश. १७) प्रथम पुलोमावी राजवंश. १८) अरिष्ठ्यकर्ण राजवंश. १९) हाल राजवंश. २०) मंतलका राजवंश. २१) पुरिंद्रसेन राजवंश. २२) सुंदर सातकर्णी राजवंश. २३) चकोर राजवंश. २४) शिवस्वाती राजवंश. २५) गौतमीपुत्र सातकर्णी राजवंश. २६) वासिष्टीपुत्र सातकर्णी राजवंश. २७) वासिष्टीपुत्र द्वितीय पुलुमावी राजवंश. २८) गौतमीपुत्र यज्ञ सातकर्णी राजवंश. २९) माथारीपुत्र सक्सेन राजवंश. ३०) गौतमीपुत्र विजय सातकर्णी राजवंश. ३१) वासिष्टीपुत्र चंद्रस्वती राजवंश. ३२) तृतीय पुलोमावी राजवंश. []

यादव काळ पुढील प्रमाणे:- तैलप तिसरा ह्या शेवटच्या चालुक्य राजाचा कलचुरी बिज्जाल याने पराभव करून ११५७ मध्ये नाशिकचा ताबा घेतला आहे.
इ.स.११७५ नंतर चालुक्याचे खानदेशचे मांडलिक सरदार यादव प्रभावी झाले आहे.व त्यांनी भिल्लम यादव दुसरा यांच्या कालखंड पर्यंत देवगिरी ते नाशिक राज्यविस्तार त्यावेळेस सिन्नर ही राजधानी होती. सिन्नर- सिंदीनगर,सेउनुर,श्रीनगर, या नावानी ओळख होती.१२ व्या शतकापर्यंत यादवांची राजधानी होती.
इ.स. १२९४ मध्ये दक्षिणेत अल्लाउदिन खिलजीच्या आक्रमन रामचंद्र यादवांच्या देवगिरीवर झाले. त्यानंतर १३१०,१३११,१३१८,च्या लढाई नंतर यादवांचा पूर्ण पाडाव होऊन देव्ग्री हिंदू राज्य संपुष्टात आले.
अल्लाउद्दीन खिलजीने यादवांचा पाडाव करून नाशिकचा बराचसा प्रदेश काबीज केला.
खिलजी व मलिक कपूर यांच्या वीस वर्षांच्या राजवटीनंतर दिल्लीच्या सुभेदाराच्या अखत्यारीतला हा प्रदेश बहामनी राजवटीत इ.स. १३४७-१४९० पर्यंत होता.
इ.स.१४९०-१६३६ बहामनी सत्तेच्या पाडावानंतर नगरच्या निजामशाही सुल्तानात समाविष्ट झाला.
अहमदनगरच्या निजामशाही सत्तेनंतर हा प्रदेश औरंगजेबाच्या मोगल सुभेदारीत समाविष्ट झाला.[][] मुस्लिम कालखंड पुढील प्रमाणे:- इ.स.१२९७ अल्लाउदिन खिलजीच्या काळात त्याचा सेनापती उलुघखान याने नाशिकच्या बागलाण परिसरात स्वतःला राज्यकर्ता म्हणून घोषित केले.
इ.स.१३०६ रामदेवानाही देवगिरीच्या दिल्लीच्या सत्तेचे मांडलिक म्हणून राहील म्हणून मान्य केले. व बागलाण प्रदेश आपल्या राज्यात समाविष्ट केला.
इ.स १३४७ हा प्रदेश बहामनी साम्राज्याचा दौलताबाद उपप्रांताच्या अखत्यारीत आले.
इ.स.१३६६मध्ये बागलाण प्रांताचा प्रमुख गोविंददेवाने महमद शहा बहामनी विरुद्ध मराठ्यांचे बंड घडवून आणले.
इ.स.१६०९मध्ये नाशिक प्रदेश मिया राजू ह्यांच्या नियंत्रणाखाली आला.
इ.स.१६३२पर्यंत मोगलांनी दख्खन, वऱ्हाड, खानदेश या प्रांतांसह नाशिकमध्ये मोगल साम्राज्याचा पाया पक्का केला.
इ.स.१६८२पर्यंत मोगलांनी बरेच विजय मिळवले.
शहजादा महमद आझम या अनुभवी सरदाराची नेमणूक बहादूरगड आणि गुलशनाबाद (नाशिक) येथेकेली.
इ.स.१६८८मध्ये मतबर खान नावाच्या बलाढ्य सरदाराची नेमणूक झाली.
इ.स.१६९६मध्ये मराठ्यांनी नाशिकच्या काही भागात अंमल बजावला.
इ.स.१७०७पर्यंत म्हणजेच औरंगजेबाचे मृत्यूपर्यंत हा भाग मोगलांच्या ताब्यात होता.यामध्ये झुल्फिकार खान, ममार खान, मतबर खान आदी अधिकारी नाशिक-खानदेशवर नियुक्त होते.
शाहूंच्या सुटकेनंतर स्थिरस्थावर झाल्यावर शाहूंचे पेशवे बाळाजी विश्वनाथांनी दिल्ली करारात मोगलांकडून दख्खनची चौथाई सरदेशमुखी मिळवली. त्यात तत्कालीन नाशिक जिल्ह्याच्या उत्तरेकडील भागाचाही समावेश होता.
बागलाण गलना भागात दाभाड्यांची पकड होती. इ.स.१७३१ च्या काळात पहिल्या बाजीरावचे नाशिक, पेठ, या भागांवर वर्चस्व होते.[][]

मराठा कालखंड पुढील प्रमाणे:- इ.स.१७४७पर्यंत म्हणजेच औरंगजेबाच्या मृत्यूपर्यंत हा भाग मोगलांच्या ताब्यात होता.
इ.स.१७४७नंतर नाशिकवर मराठ्यांचा पूर्ण अंमल झाला.
सरदार नारोशंकर राजे बहादर ह्यांनी रामेश्वर मंदिर बांधून नारोशंकराची घंटा बांधली.
१७३८ साली कपालेश्वर मंदिर बांधले.
सरदार चंद्रचूड यांनी १७५६मध्ये सुंदरनारायण मंदिर बांधले.
काळाराम मंदिराच्या जीर्णोद्धाराचे काम १७९० साली सरदार आडेकरांनी पूर्ण केले.
१७४८ मध्ये निजाम-उल-मुक्त आसफ जहा वारल्यानंतर त्यांचा मुलगा नासीर युंग सत्तेवर आला.
व बाजीराव यांच्या मृत्यूनंतर त्यांचे ज्येष्ठ पुत्र नानासाहेब पेशवे पदावर विराजमान झाले.
तरीही निजाम व मराठ्यांचे वाद होताच. इ.स.१७५१ मध्ये नसीर यांगचा खून झाल्यावर निजामाचा तिसरा पुत्र गादीवर आला. त्याने फ्रेंचांच्या मदतीने औरंगबादवरून मराठ्यांवर चाल केली.
परंतु मराठ्यांनी त्याला इ.स.१७५२ च्या शांतता करारान्वये परतून लावले. ह्या करारानुसार गोदावरी व तापी नदीमधील खानदेशचा पूर्ण भाग मराठ्यांचा सत्तेत आला.
पहिल्या निजामाच्या मृत्यूनंतर पेशव्यांनी १७५१ मध्ये नासिक हे नाव पुन्हा सुरू केले.
इ.स.१७६०-६१ मधील सलाबात जंगच्या पराभवानंतर नासिक हे पेशवाईतील प्रमुख ठिकाण बनले.
इ.स.१७६१ नानासाहेबाच्या मृत्यूनंतर माधवराव पेशवे पदावर आले.
इ.स.१७६३ विनायकरावाने पेशवे प्रदेशातील नाशिक, जुन्नर, संगमनेर शहरांची लयलूट केली.
यानंतर पेशव्यांनी बालाजी सखाराम यांना बागलांचा सरसुभेदार नेमले.
इ.स.१८१८ पर्यंत हा भाग पेशव्यांचा हाती होता. पण १८१८ मध्ये थोमस हिस्लॉपच्या ब्रिटिश सैन्याने कोपरगाव घेतले. चांदवडच्या उत्तरेकडील भाग जिंकला. ७ मार्च १८१८ खानदेशातील थाळनेर, चांदवड किल्ला जिंकून १८१८ मार्च अखेर होळकरांच्या नाशिकवर पूर्ण ताबा मिळवला.[][]

ब्रिटिश कालखंड पुढील प्रमाणे:- ब्रिटिशांनी मध्ये मराठ्यांच्या राज्य मिळवले.
१८५७ मध्ये नाशिक महत्तवाचे ठिकाण बनले. ब्रिटिश सरकारविरोधात दक्षिण सरकारविरोधात दक्षिण नाशिकच्या व उत्तर अहमदनगरच्याभिल्लांनी भाग घेतला. ते जवळ जवळ ७ हजार लोक होते. यात मागोजी नाईक हा महत्त्वाचा होता. त्याने सर्व भिल्लांना एकत्र केले होते.
ह्याने नाशिकमधील बंडाचे जनकत्व घेतले. भिल्लांच्या मदतीने ब्रिटिशाविरुद्ध बंडाचा झेंडा फडकवला.
आपल्या पन्नास टोळ्यांना त्याने आपल्या बंडात समावेश करून घेतले. त्याच्या बंदोबस्तासाठी लेफ्टनंट हेनरी, टी.थॅचर, एल.टेलर हे अधिकारी आले. हल्ल्यापूर्वी संगमनेर व सिन्नरच्या मामलेदारांनी मागोजीला शरण येण्याचा प्रस्ताव ठेवला. व त्याने तो ठुकरावला. १८५७ साली बंडातील लोक नाशिक जिल्ह्यातल्या २४ गावांत छोट्या जहागिरीत शिरले. यावेळी ब्रिटिशधार्जिणे राजे भगवंतराव व त्याच्या माणसांस फासावर लटकावले. भोगोजी नाईक हे आणखी एक बंडखोर नेते होते. त्यांचा बंदोबस्त करण्यासाठी कॅखप्टन नटरलरने वर्षभर प्रयत्‍न केले. पण जमले नाही. भोगोजी नाईक हे ब्रिटिशांशी सिन्नर, येवला या भागांत लढले. भोगोजी नाईकचा पराभव करून त्यास मारण्यास सटर ह्या इंग्रज सेनानीला यश मिळाले. त्यानंतर १८६० पर्यंत शांतता होती. इ.स.१८६० मध्ये नाशिकला स्वतंत्र जिल्ह्याचा दर्जा मिळाला.
इ.स.१८६१ मध्ये ॲंग्लो व्हर्नॅक्युलर स्कूलची स्थापना झाली.
इ.स.१८६४ मध्ये नाशिकला नगरपरिषदेचा दर्जा मिळाला.
इ.स.१८६४ मध्ये नाशिकला नाशिक वृत्त नावाचे वर्तमानपत्र चालू झाले.
इ.स.१८७७ मध्ये गोपाळ हरी देशमुख यांचे नाशिकमध्ये आगमन झाले.
इ.स.१८७७ मध्ये नाशिकच्या सार्वजनिक जीवनात न्यायमूर्ती रानडे यांचे आगमन
इ.स.१८९९ मध्ये सावरकरांनी गुप्तपणे नाशकात राष्ट्रभक्त समूह नावाची समाजाची स्थापना झाली.
मित्रमेळा नावाची संघटना नाशिकचे नाव झळकावू लागली.
१. वीर सावरकर इंग्लंडला गेले.त्यांनी मित्रमेळाचा कारभार तेथून सांभाळला.
२. टिळकांनी ३१ मे १९०७ साली सरकारच्या रिस्ते सर्क्युलरला विरोध करण्यासाठी नाशकात सभा घेतली.
३. मित्रमेळात औरंगाबादच्या अनंत कान्हेरेचा समावेश झाला.
४. २१ डिसेंबर १९०९ रोजी जुलमी जिल्हाधिकारी जॅक्सनला गोळ्या घातल्या.
५. जॅक्सन खून प्रकरणात कृष्ण गोपाळ कर्वे, नारायण जोशी, गणेश जोशी यांची चौकशी झाली.
६. २९ मार्च १९१० रोजी कान्हेरे, कर्वे, देशपांडे यांना फाशी देण्यात आली. त्यांचे स्वातंत्र्यलढ्यातील योगदान फार मोठे होते..
७. सावरकरांना तुरुंगात डांबण्यात आले.
८. २५ फेब्रुवारी १९६६ साली ८३ व्या भारताच्या या महापुत्राने योगसमाधी घेतली.
९. बाबासाहेब अंबेडकरांचे नाशिक मधील योगदान महत्त्वाचे होते.
१०. बाबासाहेब अंबेडकरांनी काळाराम मंदिरात अस्पृश्यांना प्रवेश मिळून दिला. हा सत्याग्रह देशभर गाजला. [][]

आधुनिक काळातील इतिहास

भारतीय स्वातंत्र्यलढ्यात इ.स. १९०९ साली अनंत कान्हेऱ्यांनी नाशिकचा ब्रिटिश कलेक्टर जॅक्सन याचा वध इथल्याच विजयानंद रंगमंदिरात केला होता. अभिनव भारत मंदिर तिळभांडेश्वर गल्ली येथे - इ.स.१८५७ ते इ.स.१९४७ पर्यंतच्या भारतीय स्वातंत्र्य हुतात्म्यांना श्रद्धांजली म्हणून या स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी अभिनव भारत मंदिर संस्थेमार्फत इमारतीची स्थापना केली गेली किंवा आहे. येथे स्वातंत्र्य देवतेची मूर्ती आहे.तसेच येथे हुतात्मा कान्हेरे कक्ष आणि दुसऱ्या जागीर हुतात्मा कर्वे कक्ष व हुतात्मा देशपांडे कक्ष आहेत.याच इमारतीच्या आसपास ब्रिटिश कलेक्टर जॅक्सनचा वध कसा करायचा याचा आराखडा ठरवला गेला होता. भीमराव रामजी आंबेडकर यांनी येथील काळाराम मंदिरात अस्पृश्यांना प्रवेश मिळावा म्हणून सत्याग्रह केला होता. भारतीय चित्रपटाचा उगम नाशिकशी निगडित आहे.कारण भारतीय चित्रपटसृष्टीचे जनक मानले जाणारे दादासाहेब फाळके यांचे जन्मगांव आहे १२ ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेले त्र्यंबकेश्वर हे नाशकापासून जवळच आहे.फाळक्यांचा पहिला स्टुडियो नाशिकमध्ये सध्या असलेल्या महात्मा फुले मंडईजवळ होता.

वाइन उद्योग

नाशिकचे वर्णन "भारताची वाईन कॅपिटल" असे केले जाते, नाशिक भागात दरवर्षी दहा हजारापेक्षा जास्त टन द्राक्षांचे उत्पादन होते. सन् २०१३ मध्ये, संपूर्ण भारतातील ४६ वाईनरीजपैकी नाशिकमध्ये २२ वायनरी नाशिक येथे होत्या. द्राक्षशेतीमुळे नाशिक भारताचे वाइन कॅपिटल म्हणून उदयास आले आहे. आज सुमारे चाळीस छोट्या-मोठ्या वायनरी नाशिकमध्ये आहेत. या उद्योगाला आवश्यक असलेले टेस्टिंग, प्रोसेसिंग, बॉटलिंग, प्रनिंग, फर्मेंटेशन, गुणवत्ता तपासणी, ग्रेप क्रशिंग या सात क्षेत्रांत अतिरिक्त उद्योग येथे तयार होत आहेत. दर वर्षी येथे भरवल्या जात असलेल्या सुला फेस्ट या मद्य उत्सवाला मोठी गर्दी असते.

नाशिकमधील मंदिरे

  • काळा राम मंदिर - पंचवटीमधील हे प्रमुख मंदिर असून रंगराव ओढेकर यांनी इ.स .१७८० साली त्याचा जीर्णोद्धार केला. या मंदिराचा दगड हा रामशेज डोंगरातून आणला गेला. प्रत्येक दगड उकळत्या दुधात टाकून बराच वेळ तो तसाचा ठेवला जाई. जो दगड तडकला नाही तोच दगड मंदिरासाठी वापरला गेला असे सांगतात. या मंदिरावर कलाकुसर फारशी नाही. आहे तो भव्यपणा आणि डोळ्यात भरण्यासारखा नितळपणा. मंदिराभोवती चिरेबंदी कोट असून त्याच्या आत चारही दिशांना यात्रेकरूंसाठी अग्रशाला बांधलेल्या आहेत. अगस्ती मुनींनी दाखविलेल्या वाटेवरून प्रभू रामचंद्र हे पंचवटी क्षेत्री आले. येथील निसर्गसौंदर्य त्यांना आवडल्याने त्यांनी जवळच लक्ष्मणाकरवी येथे एक सुंदर पर्णकुटी बांधली. आजचे काळाराम मंदिर ह्या प्राचीन पर्णकुटीच्या जागेवर उभे आहे, असे सांगतात. ह्या मंदिरातील राम हा आत्माराम आहे. त्याच्या डाव्या हातात धनुष्य आणि उजवा हात हृदयावर ठेवलेला आहे. ह्याच्या केवळ क्षणमात्र दर्शनाने भाविकांच्या मनाला आध्यात्मिक शांती मिळते आणि त्यांचे मनोविकार शून्य होतात, अशी समजूत आहे. मंदिरासमोर सभामंडपात उभा मारुती आहे. ह्याची मुद्रा दासमारुतीची आहे. प्रभू रामचंद्रांचे चरण आणि मारुतीचे मस्तक हे सरळ रेषेत आहेत. रामनवमी उत्सवात रामदास स्वामी येथे पुराण वाचन करीत असत. रामदास स्वामींना "रघूनायका मागणे हेचि आता" हे पद येथेच सुचले.[]
  • सीतागुंफा - राममंदिराच्या उत्तरेला भूगर्भात एक गुंफा आहे. निरुंद अशा सात पायऱ्या उतरून खाली गेल्यावाऱ तिथे राम, सीतालक्ष्मण यांच्या मूर्ती आहेत. तेथून दक्षिणेस कोनाड्यासारखा एक मार्ग असून त्याच्या पायऱ्यांवरून सरपटत खाली उतरावे लागते. तिथे आणखी एक छोटी गुहा असून त्या गुहेत शिवलिंग आहे. असे सांगतात की, रावणानी सीतेचे अपहरण करून लंकेत नेले ते सीतेचे मायावी रूप होते आणि खरी सीता ह्या गुहेत राहिली होती.
  • नारोशंकर मंदिर - (रामेश्वर मंदिर) सरदार नारोशंकर यांनी १७४७ साली बांधले. मंदिरावर टांगलेली घंटा नारोशंकराची घंटा म्हणून प्रसिद्ध आहे. चिमाजी अप्पाने वसईचा किल्ला फिरंग्यांकडून सर केल्यानंतर तिथून ही घंटा नारोशंकरांनी आणली व देवापुढे टांगली. ही घंटा इ.स. १७२१ साली पोर्तुगालमध्ये ओतली असल्याचा उल्लेख आहे. घंटेचा आवाज तीन कोस (१०किलोमीटर) दूरपर्यंत जातो, असे म्हणतात. १९६९ साली गोदावरी नदीला पूर आला त्यावेळी घंटेला पाणी लागले आणि मोठा घंटानाद झाला होता असे सांगतात.
  • गंगामंदिर - रामकुंडाजवळचे हे मंदिर इ.स. १७०० साली गोपिकाबाई पेशवे यांनी बांधले. हे मंदिर बारा वर्षांतून एकदा म्हणजे केवळ सिंहस्थ पर्वात वर्षभर उघडे ठेवतात व इतरवेळी बंद असते.
  • याशिवाय बालाजी, मुरलीधर, गोराराम, तिळभांडेश्वर, एकमुखी दत्त, निलकंठेश्वर, विठ्ठल, तिळ्या गणपती, मोदकेश्वर आदी बरीच मंदिरे आहेत.

मठ

नाशिकमध्ये मंदिरांखेरीज काही संत-सत्पुरुषांचे मठ व गोसावी, बैरागी यांचे आखाडेही आहेत.

येथील कैलास मठाच्या वतीने श्री सरस्वती पुरस्कार दिला जातो.

उत्सव

नाशिक क्षेत्रात रामनवमीचा उत्सव, गंगा-गोदावरी महोत्सव, त्रिपुरी पौर्णिमेची दीपाराधना असे बरेच उत्सव असतात.

सिंहस्थ कुंभ मेळा

हिंदू पौराणिक आख्यायिकेनुसार समुद्रमंथनातून अमृतकुंभ बाहेर निघाला. त्यावरून देव व दानव यांच्यात युद्ध झाले होते. युद्धात अमृतकुंभातील चार थेंब जमिनीवर पडले. ज्या चार ठिकाणी हे अमृताचे थेंब पडले, त्या चार ठिकाणी कुंभमेळे भरतात. पहिला थेंब हरिद्वारमधील गंगा नदीत, दुसरा थेंब उज्जैन येथील क्षिप्रा नदीत, तिसरा थेंब नाशिक येथील गोदावरी नदीत व चौथा थेंब प्रयाग येथील गंगा, यमुना व सरस्वती नद्यांच्या संगमावर पडला होता. अलाहाबाद, हरिद्वार, उज्जैन आणि नाशिक आज ही चार स्थळे तीर्थक्षेत्र म्हणून प्रसिद्ध असून येथे कुंभमेळा भरतो.

नाशिक शहर एक महाकुंभच्या नावाने ओळखले जाते. हा जगातील सर्वात मोठा धार्मिक उत्सव आहे. हा कुंभ मेळा बारा वर्षांनी भरतो. कुंभ मेळा नाशिक मध्ये पंचवटी-रामकुंड येथे आणि त्र्यंबकेश्वरला कुशावर्त घाटावर भरतो. या कुंभ मेळ्यासाठी साधू, महंत, भाविक हे लाखोंच्या संख्येने गोदावरीच्या तीरी पवित्र स्नान करण्यासाठी उपस्थित असतात. २०१५ साली कुंभमेळा भरला होता. नंतरचा २०२७ साली भरेल.

 
 
 

नासिक शहर’ हे प्राचीन असे नाव आहे. सध्या सगळे लोक ‘नासिक’ या शहराच्या नावाचा उल्लेख हा ‘नाशिक’ असा करतात. परंतु त्या शहराचे मूळ नाव ‘नासिक’ असे आहे. ‘नासिक’ शहर हे भारतातील महत्त्वाच्या तीर्थक्षेत्रांपैकी एक आहे. दक्षिणेकडील गंगा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ‘गोदावरी नदी’चा उगम हा त्र्यंबक गावाला लागून असलेल्या ‘ब्रह्मगिरी’ पर्वतावर होतो. ‘नासिक’ शहरात शिरताना गोदावरी नदीचे पात्र फार विस्तारलेले दिसते.

प्राचीन काळामध्ये ‘नासिक’ शहराचे उल्लेख हे नासिक्य, जनस्थान, त्रिकंटक; तसेच, पद्मनगर असेदेखील आढळून येतात. रामायणामध्ये आलेल्या उल्लेखानुसार दंडकारण्यातील ‘जनस्थान’ म्हणजेच ‘नासिक’. ‘नासिक’मधील ‘पंचवटी’ म्हणजे पाच ऋषिकुमारांचे प्रतीक असून ते शापित ऋषिकुमार प्रभू रामांच्या स्पर्शाने मुक्त झाले असे मानले जाते. राम, लक्ष्मण, सीता गोदावरीच्या तीरावर जनस्थानामध्ये पंचवटी येथे पर्णकुटी बांधून राहिले होते, ते ठिकाण म्हणजेच ‘नासिक’.

लक्ष्मणाने रामाशी विवाह करण्याची अभिलाषा धरून आलेल्या शुर्पणखेचे कान आणि नासिका म्हणजे नाक, तेथेच तलवारीने छाटून टाकले. म्हणून त्या स्थानाला ‘नासिक’ म्हणू लागले, अशी एक उपपत्ती आहे. दुसरी उपपत्ती अशी आहे, की ते गाव गोदावरीच्या तीरावरील नऊ टेकड्यांवर वसले, म्हणून ते ‘नवशिख’. पुढे, त्याचा अपभ्रंश ‘नाशिक’ असा झाला. त्या नऊ टेकड्या नासिक शहरात पाहण्यास मिळतात – 1. जुनी गढी, 2. नवी गढी, 3. जोगवाडा टेक, 4. पठाणपुरा टेक, 5. म्हसरूळ टेक, 6. डिंगरआळी टेक, 7. सोनार अळी टेक, 8. गणपती डोंगर, 9. चित्रघंटा टेक.

  कृतेत पद्मनगरं त्रेतयांतू त्रिकंटकं |
द्वापारातु जनस्थान कलौ नासिक मुच्यते |
कशी पुरी च केदारी महाकलोथ नासिकम् |
त्र्यंबकं च महाक्षेत्रंपंचदीपा इमे भुवि |

 हा श्लोक पद्मपुराणातील असून प्रत्येक युगातील ‘नासिक’च्या नावाची माहिती त्यामध्ये मिळते. म्हणजेच पद्मपुराण जेव्हा लिहिले गेले त्याच्या पूर्वीपासूनच ‘नासिक’ हा उल्लेख सापडतो.
‘नासिक’ शहराचा जो प्राचीन इतिहास उपलब्ध आहे त्यामध्ये इसवी सनपूर्व दुसऱ्या शतकाच्या सुरुवातीस महाराष्ट्रात ‘सातवाहनां’ची सत्ता उदयास आली. त्याच्याही आधी ‘नासिक’ हे शहर संपूर्ण भारतात माहीत होते. नासिकचा उल्लेख हा ‘नासिक्य’ असा इसवी सनपूर्व पाचव्या-चौथ्या शतकात निर्माण झालेल्या वाङ्मयातून आलेला आहे. कौटिल्याने देखील ‘नासिक’चा उल्लेख हा ‘नासिक्य’ असाच केलेला आहे. कात्यायनाच्या ‘वृत्तिकांत’ या ग्रंथात इसवी सनपूर्व 250 मध्ये ‘नासिक्य’ हाच उल्लेख येतो.
नासिक आणि बौद्ध धर्म यांचा संबंध हा प्राचीन काळापासून दिसून येतो. ‘महामायुरी’ या महत्त्वाच्या ग्रंथात ‘नासिक’ येथे सुंदरयक्ष(सुंदर तरुण देवता) असल्याचा उल्लेख मिळतो. त्याच कालखंडामध्ये ‘नासिक’ येथे संपूर्ण नासिकमध्ये प्रसिद्ध असलेली ‘त्रिरष्मी लेणी’ कोरली गेली. तिला लोक ‘पांडव लेणी’ संबोधतात. प्रसिद्ध खगोलतत्त्ववेत्ता टॉलेमी याने इसवी सन 150 मध्ये ‘नासिक’ शहराची नोंद ही ‘धर्मपीठ’ म्हणून केलेली आहे.
पतंजली याच्या ‘महाभाष्य’ या ग्रंथात ‘नासिक’चा उल्लेख येतो. जैन परंपरेनुसार जैनांचे आठवे तीर्थंकर ‘चंद्रप्रभ’ यांनी ‘नासिक’ येथे कुंतिविहार नावाचे मंदिर बांधले. ती नोंद इसवी सन चौदाव्या शतकातील जीन प्रभुसूरींच्या ‘विविधतीर्थकल्प’ या ग्रंथामध्ये मिळते.
महानुभाव पंथाचे संस्थापक ‘चक्रधर स्वामी’ नासिकमध्ये काही काळ फिरल्याचे संदर्भ हे त्यांच्या ‘स्थानपोथी’ या ग्रंथात मिळतात. चक्रधर स्वामी हे नासिक येथे पंचवटी येथे वास्तव्यास होते. त्यांनी रामनाथ, महालक्ष्मी, विनायक आदित्य, कपालेश्वर या ठिकाणी त्या काळात भेटी दिल्या असे उल्लेख आहेत. नंतर ते गोवर्धन, त्र्यंबक, अंजनेरी, या ठिकाणी गेले आणि परत ‘नासिक’ येथे आले आणि ते ‘नासिक’मधून बीड येथे निघाले.
‘नासिक’ 1347 पर्यंत यादवांच्या अधिपत्याखाली होते. ‘बहामनी’ सत्तेने तेथे 1490 सालापर्यंत वर्चस्व राखले. गावाचा उल्लेख तेव्हादेखील ‘नासिक’ असाच सापडतो. बहामनी सत्तेची शकले 1490 सालानंतर उडाली त्यानंतर ‘नासिक’ हे शहर अहमदनगरचे निजामशहा याच्या ताब्यात1636 पर्यंत होते. समर्थ रामदास स्वामी पंचवटी येथील रामउपासकाला लिहिलेल्या पत्रामध्ये (1644) नासिकचा उल्लेख हा ‘जनस्थान’ असा करतात. तो श्लोक पुढीलप्रमाणे:-
जनस्थान गोदातटी | परमपावन पंचवटी ||  येथे घडली कृपादृष्टी | रघुत्तमरायाची ||
‘नासिक’ शिवाजी महाराजांच्या काळातदेखील दिसून येते. दक्षिणेची काशी असलेल्या ‘नासिक’ शहराचे नाव मोगल बादशहा औरंगजेब याने ‘गुलशनाबाद’ असे केले. ‘नासिक’ हाच मूळ उल्लेख तेथे मराठ्यांच्या राज्यात 1760  ते 1818 पर्यंत मिळतो. इंग्रजांचा अंमल ‘नासिक’ शहरावर 1818 नंतर सुरू झाला तेव्हा देखील ‘नासिक’ हाच उल्लेख मिळतो. इंग्रजांनी ‘नासिक’ शहराला 1870 साली जिल्ह्याचा दर्जा दिला आणि जे गॅझेटीयर काढले त्याचे नावदेखील ‘बॉम्बे प्रेसिडेंसी नासिक डिस्ट्रिक्ट गॅझेटीयर’ असे आहे.
 
 
https://indiandistricts.in/cultures/maharashtra/nashik/political-history/

NASHIK

History

Last updated on 6 November 2025. Help us improve the information on this page by clicking on suggest edits or writing to us.

Nashik district, situated in northwestern Maharashtra along the Godavari River, possesses a rich and layered history. For millennia, it has served as a revered center of pilgrimage, while its strategic location has also made it a coveted seat of power for the great dynasties of the Deccan. The district’s identity is uniquely intertwined with these deep spiritual traditions and its significant political past.

The roots of its spiritual heritage are embedded in the epic Ramayan, and its landscape is marked by ancient sites like the Pandavleni Caves and the Jain center of Mangi-Tungi. This sacred importance is perhaps most famously expressed through the Kumbh Mela, one of the region's most venerable gatherings, which has been hosted here for centuries.

Alongside this spiritual legacy, Nashik's political history is told through its formidable hill forts, which are representative of various dynasties in the region. These structures served as strategic centers for successive rulers, from the Satavahanas to the Marathas. In a more recent era, the district also played a pivotal role in India’s struggle for independence, contributing its own chapter to the nation's fight against colonial rule. The legacy of these spiritual traditions and political conflicts has left an indelible mark on the district, shaping its unique cultural and historical identity.

Etymology

The word Nashik finds its origins in Sanskrit word Nasika, which translates to nose. According to the Ramayan, it was in Panchavati (present Tapovan area in Nashik city), that Lakshman severed the nose of the Surpanakha (Ravan’s sister). In observance of this event and its cultural significance, there stands a Lakshman Mandir in the Tapovan area of Nashik today. Consequently, this act has given rise to the local belief that the city gained its name, Nashik, from this significant episode in the Ramayan. Further, according to Hindu legends, Nashik is identified with different names in various Yugas. During Satya Yuga, it was referred to as Padmanagar, in Treta Yuga as Trikantak, in Dvapara Yuga as Janasthana, and finally, in Kali Yuga, it became Navashikh or Nashik.

It is believed that during the Mughal period, Nashik bore a different name: Gulshanabad. This title attempted to encapsulate the essence of Nashik during that era, evoking images of roses in a timeless cityscape.

The city was named as it is today in the early 19th century when the Marathas gained control over Nashik. Although the Maratha rule was short-lived due to the advent of the British, the name endured.

Tapovan area: The place where it is believed that Surpanakha's nose was severed.
Tapovan area: The place where it is believed that Surpanakha's nose was severed.

Ancient Period

Nashik holds deep historical and religious significance. The region is prominently featured in the Ramayan, and its landscape is dotted with archaeological sites that trace the rise and fall of the great dynasties of the Deccan. From its sacred rivers to its rock-cut caves, Nashik's past is a testament to its enduring importance as a spiritual and political center.

An approximate timeline of the major powers that ruled over or likely influenced the Nashik district between the 2nd century BCE and the 13th century CE. (Source: CKA Archives)
An approximate timeline of the major powers that ruled over or likely influenced the Nashik district between the 2nd century BCE and the 13th century CE.

Early Religious and Epic Significance

Nashik’s most ancient identity is tied to the epic Ramayan. Panchavati, situated on the left bank of the sacred Godavari River, holds a profound significance as the very spot where the crucial phase of Sri Ram's exile is believed to have unfolded. According to tradition, the entire Aranya Kanda of the epic took place here, weaving Nashik into the fabric of revered Hindu yatri sites.

Nashik’s association with the Kumbh Mela is also rooted in ancient Hindu Puranas, which tell the story of the Samudra Manthan. During a divine struggle for a pot of immortalizing nectar, drops are said to have fallen on Nashik, consecrating it as one of the four sacred sites for the festival.

Alongside its significance in Hindu traditions, ancient Nashik was also a prominent center for Jainism and Buddhism, with numerous sacred sites bearing witness to the deep roots of these faiths in the region.

Mangi-Tungi and the Jain Tradition

A key site illustrating the deep roots of Jainism in the region is Mangi-Tungi, a twin-peaked hill located in present-day Tahrabad village. Revered in Jain tradition as the place bearing the sacred footprints of Rishabhanatha (also known as Adinatha), the first Tirthankara, the site’s sanctity is tied to the earliest phase of Jainism. For centuries, the ancient mandirs and caves atop these hills have served as a significant yatri destination.

The intricate carvings and sculptures found within are tangible expressions of Jain tradition in the region. Although detailed historical records from ancient times may remain elusive, the significance of Mangi Tungi endures as an integral chapter in Jain religious history.

Mangi Tungi in Tahrabad has been a prominent Jain pilgrimage site for centuries. The hilltop mandirs attract devotees for worship and rituals, reflecting the region’s rich Jain cultural and architectural heritage.
Mangi Tungi in Tahrabad has been a prominent Jain pilgrimage site for centuries. The hilltop mandirs attract devotees for worship and rituals, reflecting the region’s rich Jain cultural and architectural heritage.

Early Rulers and Trade Networks (c. 2nd Century BCE Onwards)

While Nashik would later fall under the influence of major dynasties, its earliest history was likely shaped by local chieftains. It is important to note that prior to the ascendancy of these larger powers, Nashik was likely governed by local chiefs who were subservient to the great commercial overlords of Tagar and Paithan. Tagar, identified in the 1st-century CE Greco-Roman text The Periplus of the Erythraean Sea, was a crucial trading center along the Dakshinapath inland trade route (present-day Ter in Dharashiv district). Similarly, Pratisthana (present-day Paithan in Chhatrapati Sambhaji Nagar) was another vital hub in the region.

According to the Gazetteer (1883), these local rulers held their headquarters at centers like Anjaneri, Saler, and Chandor, all located within the modern Nashik district. Unfortunately, the scarcity of historical sources for this early period makes it challenging to construct a comprehensive narrative of Nashik's history before the arrival of better-documented rulers.

Nashik under the Satavahanas (c. 2nd Century BCE – 3rd Century CE)

Among the ancient dynasties that ruled the Deccan, the Satavahanas stand out prominently, with their influence stretching over the region for an impressive four centuries. As the first major ruling dynasty for which distinct records remain in Nashik, their legacy is richly documented in archaeological remnants that highlight their patronage of the region's cultural and religious life.

Satavahana Patronage: The Pandavleni Caves and Inscriptions

The most prominent testament to the Satavahana era in Nashik is the Pandavleni Caves, a remarkable collection of 24 rock-cut caves situated on the Trirashmi Hills, approximately 8 km south of the city's center. Originally known as "Pundru" in the Pali language due to their yellow ochre appearance, these caves were carved to serve as residences for Buddhist monks. The modern name, "Pandav Leni," is derived from a local belief that the Pandava brothers of the Mahabharata resided here during their exile.

The construction of these caves and the generous endowments made to support the monks highlight the strong Buddhist influence that pervaded the region. Among the 24 caves, two are of particular interest: the main cave, which contains an impressive Stupa, and Cave No. 10, renowned for its detailed inscriptions. These inscriptions provide invaluable historical insights, shedding light on the rule and patronage of three key dynasties: the Satavahanas, the Western Kshatrapas, and the Abhiras.

These caves stand as a testament to Nashik's deep-rooted archaeological heritage, showcasing diverse religious practices and architectural styles. Cave No. 3, famously known as the Gautamiputra Vihara, is the largest and most impressive in the complex. An inscription confirms it was commissioned by Queen Gotami Balasiri in honor of her son, the great Satavahana king Gautamiputra Satakarni.

The Nashik Caves contain an inscription recording generous patronage for Buddhist and Jain monks, reflecting the region’s strong Buddhist influence and suggesting that early Hindu rulers of Nashik may have supported Buddhism.
The Nashik Caves contain an inscription recording generous patronage for Buddhist and Jain monks, reflecting the region’s strong Buddhist influence and suggesting that early Hindu rulers of Nashik may have supported Buddhism.

Notably, the inscriptions also reveal that patronage extended beyond the Satavahanas. Cave No. 10 is renowned for a detailed inscription by Ushavadata, the son-in-law of the Western Kshatrapa ruler Nahapana. This inscription, dating to the 2nd century CE and notable for being an early use of Sanskrit in the region, records Ushavadata’s significant contributions. He not only funded the excavation of the cave but also donated 3,000 gold coins for the food and clothing of the monks residing there. The inscription further documents his other philanthropic activities, including the donation of a field and the construction of public infrastructure, alongside records of his military campaigns. This shows that Nashik was an important center that attracted patronage from multiple powerful dynasties.

The Abhirs and a Period of Transition (c. 3rd Century CE)

Following the era of Satavahana and Kshatrapa influence, Nashik entered a brief period of transition under the rule of the Abhirs. For a duration of 67 years, the region was governed by the Abhir dynasty under King Ishwarsena Abhira. Although their historical records are often obscure, historians contend that the Abhirs were a migratory group that made their way to India from eastern Iran. This theory is supported by references in the Puranas, which mention Abhirs inhabiting the territory of Herat.

In the Deccan, they were often identified as the Gavali or Gwali community, a name derived from their primary profession as pastoral cowherders. It is also widely argued that they are the ancestors of the contemporary Ahir community, which is now found across various parts of India.

The Rashtrakutas and Continued Patronage (c.7th - 10th Century CE)

Following the Abhir interlude, the Rashtrakuta dynasty rose to become the supreme power in the Deccan by the mid-8th century. The Kalaram Mandir in Nashik stands as a living testament to the city's deep-rooted history during this era.

While its origins are associated with the Rashtrakuta period, the Mandir is most revered for the ancient pratima of Bhagwan Ram that resides within its walls, which local tradition holds to be more than two millennia old. The history of the murti is one of remarkable survival. According to local accounts, the original Mandir faced destruction during a later medieval assault. In a proactive effort to safeguard the ancient pratima, Mandir priests are said to have hidden it in the Godavari River. The Mandir lay in ruins for some time before its eventual reconstruction, ensuring the preservation of this important religious heritage.

Kalaram Mandir, located in Panchavati (Nashik district) is an 18th-century Mandir known for its black stone murtis of Ram, Sita, and Laxman.
Kalaram Mandir, located in Panchavati (Nashik district) is an 18th-century Mandir known for its black stone murtis of Ram, Sita, and Laxman.

The Yadava Dynasty and Fortification of the Region (c. 9th - 14th Century CE)

Under the Yadavas, whose empire extended from Nashik to their capital at Devagiri, the town of Sinnar (in modern Nashik district) emerged as a vital stronghold. The Yadavas were patrons of Mandir architecture and military fortifications, and their reign is marked by the construction of significant religious monuments across the region.

Gondeshwar and Trimbakeshwar Mandirs

The magnificent Gondeshwar Mandir in Sinnar, dedicated to Bhagwan Shiva, was constructed during the 11th or 12th century and is an example of the Hemadpanthi architectural style associated with the Yadavas. Another significant religious center from this era is the Shri Trimbakeshwar Mandir, which houses one of the 12 Jyotirlingas and is revered for its unique three-faced lingam showing Brahma, Vishnu, and Shiv.

Gondeshwar Mandir in Nashik stands as a testament to the legacy of the Yadava rulers, showcasing some of the most exceptional examples of surviving Hemadpanthi architecture.
Gondeshwar Mandir in Nashik stands as a testament to the legacy of the Yadava rulers, showcasing some of the most exceptional examples of surviving Hemadpanthi architecture.

Nashik retained its spiritual prominence, with rulers commissioning the construction of different religious monuments over the ages. This spiritual importance is highlighted by an essential aspect of the Yadava dynasty's history in Nashik, which is their religious patronage.  Under Yadavas, whose empire extended from Nashik to Devagiri, Sinnar (the present day Sinnar taluka of Nashik district) emerged as a vital stronghold for the dynasty during the period. Within Sinnar, a prominent testament to the Yadava dynasty's significant presence and influence can be witnessed through the magnificent Gondeshwar Mandir. This remarkable Mandir, constructed during either the 11th or the 12th century was dedicated to Bhagwan Shiv. It stands as a compelling embodiment of their legacy in the region.

Gondeshwar Mandir in Nashik stands as a testament to the legacy of the Yadava rulers, showcasing some of the most exceptional examples of surviving Hemadpanthi architecture.

Sant Nivruttinath

Sant Nivruttinath made a foundational contribution to the Warkari tradition as the elder brother and revered Guru of Sant Dnyaneshwar. He was born around 1273 in Apegaon (Chhatrapati Sambhajinagar district).

After being initiated into the Nath Yogi tradition by his Guru, Gahaninath, Nivruttinath became the spiritual guide for his younger siblings (Dnyaneshwar, Sopandev, and Muktabai). It was he who instructed Dnyaneshwar to write the Dnyaneshwari. His teachings were a blend of Nath philosophy and Varkari devotion. His primary karmabhoomi was the journey he took with his siblings, but his sacred resting place is in Trimbakeshwar, near Nashik. His Samadhi at Trimbakeshwar is a key pilgrimage site, visited by all Warkaris.

Medieval Period

While ancient records offer valuable insights into Nashik's cultural history from a historical lens, they may provide fewer details to write a comprehensive history of the region. The shifts that occurred during the early medieval era reveal significant insights into the broader Deccan region's historical evolution, including Nashik. One notable aspect that emerges is the pivotal role played by local rulers or ‘chiefs’, even when their power was relatively modest. These local leaders shaped Nashik’s political and military history highlighting their resistance against external incursion. Adding to this it suggests their assertiveness in pursuing independence and adaptability in navigating the complex regional dynamics of their time and interest for territorial expansion as well.

In 1298, Nashik district's history underwent a significant shift with a military invasion spearheaded by Alauddin Khilji of the Khilji dynasty from the North into the Deccan. This occurred during the period when the Yadava dynasty, governed by Raja Ramachandra, held sway over the region. This military campaign served as a crucial turning point, opening the path for Delhi to expand its influence into the Deccan. By 1311, this expansion had progressed to the point where the Delhi Sultanate was able to assimilate the dominion previously held by the Yadavas, solidifying the territory's inclusion within the ever-expanding dominion of the Delhi Sultanate. This event marked a significant moment in the historical narrative of Delhi's growing control and presence in the Deccan.

Nashik witnessed a series of changes in governance over the centuries. From the late 12th century, it was under the administration of Delhi officials stationed in Devgiri (present Daulatabad). Subsequently the rule transitioned to the Bahmani kings. Even though Nashik remained under the jurisdiction of Daulatabad during Bahmani rule, according to the Gazetteer (1883), neither the Bahmanis nor the Delhi Sultanate were able to exercise complete control over the region.

An approximate timeline showing the major dynasties and political regimes that governed or impacted Nashik district from the 14th century CE through the pre-independence era. (Source: CKA Archives)
An approximate timeline showing the major dynasties and political regimes that governed or impacted Nashik district from the 14th century CE through the pre-independence era.

Ramshej Fort

Ramshej Fort
Ramshej Fort

The Ramshej Fort, situated 10 km northwest of Nashik in Maharashtra, is rooted in the ancient Ramayan epic. It is believed that Ram stayed here during his exile.

During Aurangzeb's reign, the Fort, then under Sambhaji's control, became a target for the Mughals as they sought to conquer Nashik.  Aurangzeb sent Shahbuddin Gaziudin Firozejung with 40,000 soldiers and artillery to besiege the Fort. Despite the massive Mughal army, Ramshej's commander masterfully held the Fort. To counter, Chhatrapati Sambhaji dispatched Rupaji Bhosale and Manaji More with 7,000 troops, leading to a Maratha triumph.

In their desperation, the Mughals consulted a Tantrik who devised a plan using a mystical golden serpent statue. Yet, as the Mughals approached Ramshej's entrance, they were ambushed by Maratha stone attacks, forcing them to retreat. Even subsequent Mughal attempts, like one by Kasimkhan Kiramani, failed.

Bagul Kingdom

In the history of Nashik district, Baglan (present Baglan Taluka of Nashik district) stands out as a region highly coveted by external powers. Even as the historical period shifted, its importance endured. Baglan including Galna fort, which provides valuable insights into Nashik’s past, shedding light on the region’s socio-political dynamics and historical interactions. As Baglan was an integral part of the broader landscape in which Nashik is situated, its history helps contextualise and understand the historical evolution of Nashik.

A seemingly unremarkable taluka today, Baglan held an interesting history as the Bagul kingdom, likely under the rule of Rathods. Although scarce source material limits the comprehensive exploration of Rathods influence in the region. However, it is evident that for over three centuries, from 1308-1619, the Baglan Kingdom had its roots deeply embedded in the region. The area was not only rich in historical significance but also in its diverse population, which included Malis, Bhils, Marathas etc.

It is likely that the Bagul kingdom had come under the influence of the Bahmanis (1347 to 1527), as evidenced by instances of Maratha resistance against the Bahmanis. During the tumultuous period of the Bahmani-Vijayanagara hostilities, as the Bahmani Sultan had to redirect his forces to confront the Vijayanagara Empire in the Deccan. The Baglan chief, in cooperation with Bahram Khan (the Mughal army’s commander-in-chief), embarked on a daring yet ultimately unsuccessful revolt against the Bahmanis.

Strategic Significance of Baglan

The geographical feature holds a profound significance. In the Baglan area, two primary hill ranges, the Selbari range and the Dholbari range, stretch parallel to each other in an east-west direction. Baglan held great significance since the time of its Rathod rulers, as these ranges served multiple purposes. Initially, they were utilized to oversee the primary ancient commercial route, the Burhanpur-Surat tract, connecting Surat to Daulatabad and Golconda, with the proximity of Burhanpur fostering commerce in the region.

To safeguard and oversee these commercial routes, several hill forts were constructed in the Baglan region by the Rathods, specifically Salher (in present day Salher Village, Satana taluka) and Mulher (in present day Mulher village, Nashik). In later decades, when admiring the splendor and resources of ancient Baglan, the Mughal court historian Abul Fazl, in his ‘Ain-i-Akbari,’ observes that “between Surat and Nandurbar is a mountainous but flourishing tract called Baglana, the chief of which is a Rathor, commanding 3,000 cavalry and 10 infantries. Fine peaches, apples, grapes, pineapples, pomegranates, and oranges grow here. It possesses seven remarkable forts, among which are Mulher and Salher.”

Salota Fort as seen from Salher fort.
Salota Fort as seen from Salher fort.

Galna Fort

In close proximity, approximately 35 km away from Baglan, the Galna Fort was under the rule of Maratha chiefs. Positioned strategically, this fort also held great significance along the Burhanpur-Surat trade route. Located amidst the hills that stretch between Malegaon and Dhule, it stands as one of the well-preserved forts in Maharashtra, with its bastions and entrance still in a remarkably good state of repair. Until 15th century, around 1487, the Marathas firmly held sway over the fort.

A doorway at Galna Fort remains in good condition even today.
A doorway at Galna Fort remains in good condition even today.

In 1487, a major shift occurred when two brothers, Malik Wuji and Malik Ashraf (both Governors of Daulatabad) seized control of Galna fort from the Marathas, who at the time ruled under the suzerainty of the Bahamani Sultan. Chronicler Ferishta notes that during this period of political unrest in the Bahamani court, a Maratha chief who had taken possession of Galna was compelled to surrender it to Malik Ashraf.

British historian James Grant Duff similarly records that the Marathas had held Galna as a stronghold until it was recaptured by the Malik brothers around 1487. In the late 15th century, Galna became part of the Ahmadnagar Sultanate through an alliance with Bijapur and Berar. This control was soon contested: Ahmad Nizam Shah subdued the ruler of Galna in 1499, but following the murder of Malik Wagi, local chiefs in the Nashik region seized the opportunity to reassert their independence. Ahmad Nizam Shah regained control in 1507, yet the territory slipped from Ahmadnagar’s grasp again after his death in 1508.

The history of Galna during this period reflects a turbulent era of shifting power and unstable alliances. The fort’s strategic location and resources made it a highly contested prize, drawing repeated attempts at conquest and defense. The persistent efforts of the Nashik chiefs to reclaim autonomy underscore a broader resistance to external domination. Meanwhile, the Gujarat Sultanate exerted considerable influence in the wider region (commanding the loyalty of Nashik, Trimbakeshwar, and Baglan) where local rulers paid tribute and supplied troops for its service.

Dhodap Fort

Dhodap Fort, located near Chandwad in Nashik district, features rock-cut chambers, twin gateways, and a summit mazar, all perched nearly 5,000 ft. high.
Dhodap Fort, located near Chandwad in Nashik district, features rock-cut chambers, twin gateways, and a summit mazar, all perched nearly 5,000 ft. high.

Dhodap Fort, also known as Dhorapavanki or Dharablocated, near Chandwad in Nashik district, is Maharashtra’s second-highest hill fort, standing at an elevation of approximately 5,000 ft. Believed to have been built during the reign of Burhan Nizam Shah I (1509–1553) of the Ahmadnagar Sultanate, it is also referred to as Dhorapavanki or Dharab.

The fort held military and strategic importance through several historical periods. Chhatrapati Shivaji Maharaj is believed to have visited the site in 1670 CE during his return from the Surat campaign and is thought to have hidden treasures within its premises. During the Peshwa era, Dhodap Fort featured in a major conspiracy by Raghobadada Peshwa against Madhavrao Peshwa. It was later captured by the British in 1818. Captain Briggs of the East India Company, who visited that same year, remarked on the fort’s formidable defenses, artillery, and well-planned storage and water systems.

The fort contains several rock-cut chambers once used as living quarters. One large room, around 35 by 25 ft. in size, likely functioned as a granary for storing provisions such as grain, ghee, and jaggery. A small Mandir also remains within the fort. Rising nearly 400 ft. above the main structure, the fort’s summit hosts a mazar (tomb) dedicated to a pir named Bel-pir, which continues to draw devotees.

Today, the fort is a popular but challenging hiking destination. The ascent involves a steep climb that leads to a concealed rock-cut tunnel serving as the main entrance. Near the entry, two Persian inscriptions are carved into the rock—one weathered and the other still legible, recording the name of the fort’s builder. Inside the complex, a massive bastion towers above the entrance path, while to the right lies a structure believed to be the commandant’s quarters, offering a wide view of the Chandor range.

Trymbakgad or Brahmagiri Fort

This ancient fort, lying around Nashik, once revered, later became a battleground. Over time, various powers vied for their control and dominance. Their elevated positions and natural fortifications were seen as strategic places for military campaigns rather than a puja site. The forces from Delhi, driven by their imperial ambitions, endeavored to seize control of the fortress. In contrast, the Marathas were resolute in their mission to restore their former glory. For them, Trymbak Gad Fort was perhaps a representation of their historical heritage but also a strategically vital location in their ongoing quest for supremacy. As the tapestry of history continued to unfurl, the British Empire extended its dominion across India. Trymbak Gad did not escape their expansionist ambitions. The fort, perched with a commanding view and steeped in historical significance, became a focal point of interest for the British.

Jain monuments in Anjaneri

An inscription found in the Anjanari mandir (present Trimbak city) dating back to 1141 records a grant made by the Yadava rulers to the Jain mandir of Chandraprabh, the 8th Tirthankar. Even during the time, Nirkubhavansa, perhaps the local raja, also commissioned  construction of Jain caves around Ankai Fort (in present day Yeola Taluka of Nashik district). It is likely that this resulted not only in Nashik's diverse and pluralistic religious traditions but also highlights the significant role played by the Yadava rulers in shaping the cultural and religious landscape of the area.

These are considered to be some of the oldest Jain pilgrimage sites, and it is likely that the enduring historical significance of these sites has contributed to continued royal patronage of Jainism by later rulers.
These are considered to be some of the oldest Jain pilgrimage sites, and it is likely that the enduring historical significance of these sites has contributed to continued royal patronage of Jainism by later rulers.

This ancient fort, lying around Nashik, once revered, later became battleground. Over time, various powers vied for control and dominance. Their elevated positions and natural fortifications were seen as strategic places for military campaigns rather than a puja site. The forces from Delhi, driven by their imperial ambitions, endeavored to seize control of the fortress. In contrast, the Marathas were resolute in their mission to restore their former glory. For them, Trymbak Gad Fort was perhaps a representation of their historical heritage but also a strategically vital location in their ongoing quest for supremacy. As the tapestry of history continued to unfurl, the British Empire extended its dominion across India. Trymbak Gad did not escape their expansionist ambitions. The fort, perched with a commanding view and steeped in historical significance, became a focal point of interest for the British.

Additionally, these forts served as places of refuge: in 1764, amidst a disagreement between Madhav Rao and Raghunath Rao over army leadership, Raghunath sought solace by retiring to Anjaneri Fort.

Nizam Shahi

The Nizam Shahi Sultanate of Ahmadnagar, founded by Malik Ahmad Nizam Shah in 1490 after breaking away from the Bahmani Sultanate, quickly extended its influence over the Nashik region. Owing to its strategic location near the trade routes between the Deccan plateau and Gujarat, Nashik became a valuable frontier district, often caught in the crossfire between Ahmadnagar, the Gujarat Sultanate, and later the Mughals. Under Nizam Shahi rule, forts such as Trimbak, Salher, Mulher, and Ramshej were fortified to secure the northern approaches to the Deccan. The local chiefs of Baglan and Trimbakeshwar were brought under Ahmadnagar’s control through a mix of military pressure and alliances, though they remained prone to rebellion whenever central authority weakened. The fertile Godavari basin and Nashik’s position as a pilgrimage hub also contributed to its significance, prompting the Nizamshahi rulers to station trusted commanders in the area and impose revenue systems that blended local hereditary rights with central oversight. Nashik remained a contested zone throughout the 16th and early 17th centuries, repeatedly changing hands during the long Mughal: Ahmadnagar conflicts until the Sultanate’s eventual annexation by the Mughals in 1636.

Rise of Marathas

After the Mughals had annexed the Nizam Shahi of Ahmednagar in 1636, they shifted their focus on the declining Adil Shahi kingdom. At the same time Chhtrapati Shivaji Maharaj (1630-80 CE) of the Bhonsale dynasty (S/o of Shahji Bhonsale, an Adilshahi Commander and Jijabai Bhonsale), initiated his rebellion against the Adil Shah in 1646 when, at the age of 16, he captured the Torna Fort (currently in Pune).  

He first fought against the Adil Shahi forces and later clashed with the Mughals, who eventually compelled him to accept the Treaty of Purandar. Following the treaty, he was imprisoned in Delhi for a time. Upon his return in 1606, he resumed hostilities on a larger scale, swiftly recapturing all the forts lost under the treaty’s terms. Maratha generals such as Prataprao Gujar and Moropant Trimbak expanded these campaigns, levying chauth and capturing the forts of Aundha, Patta, and Salher, though these were soon retaken by the Mughals. He is also recorded to have raided Galna in 1679. After his death in 1680, the region was highly contested with the hill-forts experiencing a constant change in ownership.

In the early 1700s, the Baglan province was compelled to submit during Aurangzeb’s Deccan campaigns. Local families, such as the Povars or Dalvis of Peint (now Peth in Nashik district), resisted but were captured, sent to Delhi, and executed on Aurangzeb’s orders. Despite the outcome, their actions illustrate continued local resistance to imperial authority.

Later Marathas and the British

After the death of Aurangzeb in 1707, the Deccan underwent a significant period of political transition and realignment. The Marathas emerged as a major power, while former Mughal officials, such as Asaf Jah I (Nizam-ul-Mulk), established independent domains. Asaf Jah I founded the Nizam dynasty in Hyderabad, initiating a polity that would continue until Indian independence in 1947.

During this period, Nashik, administered by a governor based in Baglan, remained under Nizam control. In 1760, a major confrontation occurred between the Nizams and the Marathas. Following this conflict, Salabat Khan surrendered the fort of Sinnar along with several other forts to the Marathas, and the southern portion of Nashik came under Maratha administration. This transfer of territory reflected both the territorial expansion of the Marathas and the diminishing authority of the Nizams in the region.

Under Maratha control, Nashik saw continued religious and architectural activity. Notable constructions included the Rameshwara Mandir and the Naroshankar bell commissioned by Peshwa Naroshankar Raje Bahadur, the Kapaleshwara and Sundar Narayana temples built by Chandrachud, and the reconstruction of the Kalaram Mandir in 1790 by Peshwa Rangarao Odhekar. The Marathas retained control over Nashik until their defeat in 1818.

Before the British could take possession, the Marathas, specifically the Holkars of Indore, reclaimed the fort. This control lasted until December 1804, when Captain Wallace of the British forces captured the fort of Galna from the Holkars, marking yet another transfer of power in its history.

Kalaram Mandir

Kalaram Mandir, located in Panchavati (Nashik district) is an 18th-century Mandir known for its black stone murtis of Ram, Sita, and Laxman.
Kalaram Mandir, located in Panchavati (Nashik district) is an 18th-century Mandir known for its black stone murtis of Ram, Sita, and Laxman.

The Kalaram Mandir, located in the Panchavati area of Nashik, was reconstructed in 1782 under the patronage of Sardar Rangrao Odhekar. According to local tradition, the temple stands on the site where Bhagwaan Ram is believed to have resided during his exile, as described in the Ramayan. The construction, which spanned twelve years and employed approximately 2,000 laborers, features black stone murtis of Ram, Sita, and Laxman, each about two feet in height. The Mandir serves as a major religious center, particularly during the Ramnavami festival in the Hindu month of Chaitra (March–April), attracting devotees from across the region.

Colonial Period

The 19th century marked a new chapter in Nashik's history, as the district was drawn into the final conflict between the Maratha Empire and the rising British power. During the Third Anglo-Maratha War (1817–1818), Nashik’s strategic location and its formidable hill forts transformed the region into a key theater of military operations.

Fortresses such as those in Trimbak and, most notably, Malegaon became focal points of intense conflict. The Malegaon fort, constructed in 1740 by the Peshwa’s general Naro Shankar Raje Bahadur, held a vital position at the confluence of the Girna and Mausam rivers. Recognizing that its capture would grant them access to the Maratha heartland, the British made the fort a primary objective.

Malegaon, the 18th century Maratha fort.
Malegaon, the 18th century Maratha fort.

The Marathas offered staunch resistance, understanding that these forts held both strategic and deep value. Despite these efforts and numerous skirmishes, British forces ultimately prevailed. In 1818, after a significant siege at Malegaon, they wrested control of Nashik from the Holkars, marking the end of Maratha rule and the beginning of the colonial era in the district.

The Establishment of British Rule and a New District Formation (1818–1869)

By March 1818, all of the Holkar dynasty's possessions in Nashik were brought under British control. In the years that followed, the British government consolidated its administration in the region. In 1869, Nashik district was formally established as part of the Central Division within the Bombay Presidency.

Nashik District in 1883.
Nashik District in 1883.

The new district initially included twelve subdivisions: Malegaon, Nandgaon, Yeola, Niphad, Sinnar, Igatpuri, Nashik, Peth (present-day Peint), Dindori, Kalvan (present-day Kalwan), Baglan, and Chandori. Administratively, Nashik was placed under the jurisdiction of the Khandesh collectorate. This structure has largely been maintained to the present day, with the later addition of a few more talukas like Trimbakeshwar, Surgana, and Chandwad.

First War of Independence in Nashik (1857)

After Nashik fell under British control, the next significant event in its history was the 1857 revolt. While the revolt was widespread and involved numerous territories, it was not universal across India. The revolt began in Meerut and quickly spread to several parts of North and Central India, with regions like Delhi, Kanpur, and Lucknow becoming major centers.

Nashik, however, emerged as a focal point for resistance during a time when other regions in southern and western India seemed relatively calm. The Bhil community, one of the first indigenous communities to inhabit Nashik, contributed heavily. Despite their lack of modern weaponry compared to the technologically superior British, the Bhils displayed remarkable courage and resilience.

Bhagoji Naik, a former officer from the Ahmednagar police and a man of influence from the village of Nandur Shingote in Sinnar, united the Bhils of South Nashik and Ahilyanagar. They confronted British forces led by Lieutenant Thatcher on a hill near the Pune-Nashik road.

In response to the Bhil resistance, the British established a Koli corps of 600 men, leveraging the traditional rivalry between the Kolis and Bhils. In a subsequent skirmish, Bhil leaders Bhagoji and Harji led their people against the Koli Corps. This confrontation led to heavy losses for the Bhils, including the deaths of Bhagoji and his son, Yashvant. By April-May 1859, out of the 49 Bhils involved in the battle, 45 had perished, including their leader, Bhagoji.

Despite the setbacks, the resistance continued. On December 6th, reports came in about an attack on the Trimbak treasury by Bhils and Thakurs. Search operations in the surrounding hills led to the capture of several locals. A Thakur named Pandu confessed his role and mentioned a Trimbak Brahman adviser behind the uprising. Despite being outnumbered, poorly equipped, and eventually succumbing to British forces, the Bhils’ resistance highlighted their resolve for freedom and showed the wider discontent prevalent across India at the time.

Cultural and Civic Developments in Colonial Nashik

Sarvajanik Vachanalaya

Sarvajanik Vachanalaya, constructed in 1862, remains in existence to this day.
Sarvajanik Vachanalaya, constructed in 1862, remains in existence to this day.

The Sarvajanik Vachanalaya in Nashik, established around 1862 during the British era, stands as one of India's earliest public libraries and reading rooms. Situated near Shalimar Chowk, the multi-storied institution housed a remarkable collection of 175,000 books in English, Marathi, Hindi, and Sanskrit. Beyond being a library, this institution embodied a cultural movement, serving thousands of readers daily at its main library and the Sarkar Wada branch, all free of charge. The Sarvajanik Vachanalaya showcased the cultural and communal aspects of the institution, emphasizing access to education and the value Nashik placed on literacy.

Nashik News

In 1864, a notable milestone in Nashik's cultural and media landscape was achieved with the establishment of the region's first newspaper, 'Nashik News.’ It not only chronicled the happenings of the time but also became a platform for expressing opinions, sparking discussions, and providing a voice to the people of Nashik. Its inception laid the foundation for a thriving media presence in the region and set the stage for further journalistic endeavors.

Natural Disasters and Urban Development

The Great Flood of 1872

The Girna River, a major tributary of the Godavari, flows through the Nashik and Jalgaon districts. While the river sustained the district, it also triggered destructive floods, such as the one that occurred in 1872.

According to the Gazetteer (1883), this devastating flood began on the 14th of September, as heavy rains cascaded over Malegaon, persisting throughout the night until noon the next day. In the early morning of the 15th, the Mausam, a local river, surged and inundated large parts of the district. The forceful waters undermined earthen walls and sun-dried brick structures, swiftly toppling numerous homes.

Girna River
Girna River

The epicenter of the distress lay in the valley of the Girna. The Gazetteer records that over 1,500 houses suffered damage, with nearly 1,200 of them being completely obliterated. The monetary toll was staggering, with property losses amounting to over £7,500 (Rs. 75,000) and the estimated value of destroyed buildings reaching about £13,500 (Rs. 1,35,000). The agricultural heartlands bore the brunt of the deluge, as crops and lands across 128 villages were washed away, rendering vast stretches unfit for tillage.

Nashik Tram

In 1889, a significant development transformed the cityscape of Nashik with the inauguration of the Nasik Tram. Its tramcars began their journeys from the Old Municipal Building on the main road, winding their way to the Nasik Road railway station. This new mode of transportation brought unprecedented ease and accessibility to the people, enhancing connectivity within the city.

The Nashik Tram
The Nashik Tram

For a remarkable span of 44 years, the Nasik Tram faithfully served the residents of Nashik, becoming an iconic feature of daily life. Its tracks became a representation of progress and modernization, leaving an indelible mark on the city's history as it embraced advancements in urban mobility.

Nashik in the Freedom Struggle

Rise of Revolutionary Societies

Nashik emerged as a significant hub in the fight for freedom, drawing individuals from neighboring regions to join the independence movement. To truly grasp the historical context, one must realize that during that era, the spirit of the freedom movement had already taken root in the district. Vinayak Savarkar's birthplace, Bhagur, stood as the genesis of a movement that would ignite the hearts of countless patriots.

These clandestine efforts and the rise of secret societies underscore the pivotal role Nashik played in India's struggle for independence. In 1899, Vinayak Savarkar and his brother Ganesh Savarkar laid the foundation for Mitra Mela, a secret revolutionary society based in Nashik. This initiative was part of a larger network of similar groups operating across Maharashtra. In 1904, Mitra Mela underwent a transformation and emerged as the Abhinav Bharat Society (Young India Society). United in their mission, these societies staunchly believed in the necessity of armed rebellion to challenge British rule. The name 'Abhinav Bharat' was bestowed by Vinayak Savarkar, who drew inspiration from Giuseppe Mazzini's "Young Italy" movement.

The Nashik Conspiracy Case (1909)

This revolutionary fervor culminated in the infamous Nashik Conspiracy Case of 1909. On 21 December 1909, 18-year-old Anant Laxman Kanhere, who had joined the secret society in Nashik, assassinated A.M.T. Jackson, the District Magistrate. The assassination took place at the Vijayanand Theatre, where Jackson was watching a play staged in his honor. Resentment against Jackson had been growing, particularly after he placed Ganesh Savarkar on trial.

Krishna Karve, Anant Kanhere, and Vinayak Deshpande (left to right).
Krishna Karve, Anant Kanhere, and Vinayak Deshpande (left to right).

Kanhere was apprehended immediately after the act. His actions were woven into a narrative of a broader conspiracy to overthrow British rule, and he was officially implicated in the case. The assassination sent ripples of concern through Pune and Mumbai, bringing the nationalist movement under heightened scrutiny and leading to the full enforcement of restrictive laws like the "Seditious Meetings Act."

The case implicated other revolutionaries associated with the Abhinav Bharat Society, including V.D. Savarkar, Ganesh Savarkar, and N.V. Kelkar. Anant Laxman Kanhere faced trial in a Bombay court and was executed in Thane prison on 19 April, 1910, along with his associates Krishnaji Gopal Karve and Vinayak Ramchandra Deshpande. The trial also led to the arrest and deportation of the prominent leader Vinayak Damodar Savarkar.

The Nashik Satyagraha

A couple of decades after the revolutionary phase, the struggle for freedom in Nashik took a new turn. In 1930, the Nashik Satyagraha took center stage, led by Dr. Babasaheb Ambedkar. This movement aimed to secure the right of Dalits to enter the revered Kalaram Mandir. The following year, in 1931, a significant gathering of the Bombay Province Charmkar Parishad took place in Nashik to discuss aspects of the Second Round Table Conference, which Dr. Ambedkar was set to attend. Reinforcing his commitment to social justice, Dr. Ambedkar organized another temple entry movement in Nashik in 1932, advocating for the eradication of untouchability.

Alongside these movements for social reform, the spirit of nationalism was also kindled through literature. Nashik was home to poets such as Govind Trimbak Darekar, also known as Kavi Govind, whose patriotic compositions, including ‘Laghu Abhinav Mala,’ encouraged resistance against colonial rule.

As evidenced by such figures, Nashik nurtured several freedom fighters and played an integral role in India's struggle for independence. The city was a hotbed of revolutionary activities and movements against British rule. Apart from these documented figures and events, Nashik was also home to many unrecorded activists who participated in various capacities. The district's legacy in the freedom struggle is therefore rich and multifaceted, reflecting both its resistance to colonial rule and its fight for social justice and equality.

Modern Agricultural Identity: Table Grape Revolution of Ojhar (Ozar)

The late colonial period saw a remarkable agricultural transformation. In 1925, in the town of Ojhar, a visionary pioneer named Raosaheb Jairam Krishna Gaikwad initiated what would become a grape revolution. His efforts in the cultivation and production of table grapes marked the beginning of a new agricultural era for the region. This humble undertaking laid the groundwork that would, in the following decades, fundamentally transform the district's economy and identity.

Sant Janardan Swami

Sant Janardan Swami (Mahanubhav) was a 20th-century saint who made a significant contribution by establishing a major spiritual centre for the Dattatreya tradition in Nashik. He was born in 1914 and was a balyati (celibate from childhood). His

His primary karmabhoomi became Tapovan in Nashik, which he transformed into a vibrant spiritual hub. He was a siddha (realised master) known for his simple teachings, emphasis on Namasmaran (chanting the divine name), and selfless service. He established numerous ashrams and Mandirs, reviving faith for millions. His Samadhi Mandir at Tapovan, Nashik, attracts devotees from all over Maharashtra

Post-Independence

When India was granted independence in 1947, the Bombay Presidency, including Nashik, became part of the new Bombay State. On 1 November 1956, Bombay State was reorganized under the States Reorganisation Act, absorbing various territories. Subsequently, on 1 May 1960, Bombay State was dissolved and split on linguistic lines into the two states of Gujarat and Maharashtra, with Nashik becoming a district within the new state of Maharashtra.

Post-1960: A Hub of Agriculture and Industry

Following the formation of Maharashtra, Nashik district embarked on a journey of remarkable growth and diversification. Key sectors like agriculture and industry expanded significantly, while the district also made major strides in education and healthcare, establishing itself as an important regional hub.

The Grape Revolution

In the decades following independence, the pioneering agricultural efforts initiated in Ojhar during the colonial era came to full fruition. The cultivation of table grapes expanded dramatically, transforming the agricultural landscape of Nashik. What began as a local venture transcended national borders, as Nashik’s grapes came to be exported across the world to Europe, the Middle East, and Asia. This success paved the way for a thriving wine manufacturing industry, cementing Nashik's modern reputation as the ‘Wine Capital of India’ and serving as a testament to the entrepreneurial spirit that originated in the soil of Ojhar.

Modernization and a Vision for the Future

In recent times, Nashik has continued to embrace rapid urbanization and modernization. The establishment of industrial zones like Ambad has attracted further investment, cementing the city's position as a vital hub for trade and commerce. On the administrative front, proposals for the bifurcation of the district and the creation of a separate Malegaon district have emerged, reflecting a continued effort to streamline governance and address the region's evolving development needs.

Sources

Bombay Government Records. 1958. "History of the Freedom Movement in India." Vol. 2. Government Central Press, Bombay.

Cyril Manton Harris. 2013. Illustrated Dictionary of Historic Architecture. Courier.

Eugen Hultzsch. 1906. "Epigraphia Indica." Vol. 8. Archaeological Survey of India, Government of India, New Delhi.

Govind Trimbak Darekar. The Patriotic Poet. Digital District Repository Detail.

H.S. Thosar. 1990.The Abhiras in Indian History. Vol. 51. Proceedings of the Indian History Congress, Indian History Congress.

Jadunath Sarkar, tr. 1949. Ain-i-Akbari of Abul-Fazl-Allami. Vol. 2, ed. 2. Royal Asiatic Society of Bengal, Calcutta.

James Fergusson and James Burgess. 2013. The Cave Temples of India. Cambridge University Press.

James G. Lochtefeld, ed. Knut A. Jacobsen. 2008. The Kumbh Mela Festival Processions. South Asian Religions on Display: Religious Processions in South Asia and in the Diaspora. Routledge.

James Grant Duff. 1912. A History of the Mahrattas. Vol. 1. R. Cambray and Co., Calcutta.

James Macnabb Campbell. 1883. "Gazetteer Bombay Presidency." Vol. 16. Nasik.

John Briggs, tr. 1910. Ferishta and Mahomed Kasim, History of the Rise of the Mahomedan Power in India, Till the Year A.D. 1612. Vol. 3. Central Secretariat Library.

Kurt Titze and Klaus Bruhn. 1998. "Jainism: A Pictorial Guide to the Religion of Non-Violence." ed. 2. Motilal Banarsidass.

M. S. Naravane. 1997. A Short History of Baglan. Palomi Publications, Pune.

Mandar Anant Thakur. 2008. People’s Role and Contribution in Nasik Kalaram Temple Entry Satyagraha. Vol. 69. Proceedings of the Indian History Congress.

Ojas Borse. 2017. Contribution of Bhil Adivasis of Khandesh in the Revolt of 1857. Vol. 3, no. 3.Rural South Asian Studies.

Om Prakash Verma. 1970. The Yadavas and their Times. University of Michigan, Michigan.

Population Census, Jain Population in India.

Reginald George Burton. 1910. "The Mahratta and Pindari War." Government Press, Shimla.

Sherwani H.K. 1973. "History of Medieval Deccan, 1295-1724." Vol. 1.

Sudama Misra. 1973. "Janapada state in ancient India." Bharatiya Vidya Prakasana.

Sudhakar Chattopadhyaya. 1974. Some Early Dynasties of South India.

Vaishali Balajiwale. 2015. Project Trimbak, not Nashik, as the place for Kumbh: Shaiva akhadas. DNA.

Valmiki. "Ramayan: Aranya Kanda - The Forest Trek." Book 3.

Vikram Doctor. 2013. Kumbh mela dates back to mid-19th century, shows research. Economic Times.

 
 
 
 
 
 
 
 
 
 
altamash.myportfolio.com

Altamash Kadri - Nashik


Nashik, my home town is a small city situated in the northwestern part of the Deccan plateau, in the upper Godavari basin. Nashik is located at a distance of 181km, northeast of Mumbai. There are two specific reasons I am writing about this city. First, I was born here and this my home town, and second, Nashik’s religious importance and the architectural character.

Like most of the other Indian cities, the holy city of Nashik is an accretion of time. Sanctity, tradition, art, culture and modern factory industry have made a deep impact on Nashik. Although Nashik is one of the ancient cities of India, the origin of the city’s name and the subsequent change in the name can only be g=vaguely derived from the available literature. According to the early Hindu records the city was known as Padmanagar or Lotus city during the Krita Yuga. During Treta Yuga the city was known as Trikantak or three peaked city as it grew over there hills on the right bank of the river Godavari. It became Janasthan during ‘Dwapara Yuga’ when the city area expanded at the cost of the receding forests and the city became peopled. With the dawn of ‘Kali Yuga,’ the city came to be called as Nashik or Navshikh, the nine mounds on which the present city is growing. The nine hillocks apparently attracted early settlement due to seasonal floods of Holy river Godavari and location sanctity. Another version of the city’s name is Nasika meaning ‘nose’ and this was the place where Laxmana cut the nose of Shurpanakha during their exile in the mythological epic period of Ramayana. This city was also mentioned as part of the ‘Dandakaranya’ region during that period. During the Islamic rule, the name of Nashik city was changed to ‘Gulshanabad’, the city of roses and it was made the headquarters of a division.

In the year 1751-1752 the city was taken over the Peshwas and the name was revived to Nashik. In the central position at the head of the main bazaar road is the Peshwa’s ‘ New Palace’, Sarkar Wada. Many temples pools and ghats on the bank of river Godavari and the typical Maharashtrian residence are popularly known as Wadas were built during this period. The important temples are all located on the river banks forming a temple complex around numerous pools.

This city also hosts Kumbh Mela. According to the history of Hindu religion, Nashik is among the four places where the Amrit (elixir) from a Kumbha (pitcher) when the gods and demons were fighting to gain its own so that they become immortal after drinking the elixir which was found after Samudra Manthan. So due to the religious importance of the city, you find many temples over here. This festival takes place every 14 years.​​​​​​​

The core area is the old Nashik and its counterpart Panchvati area on the other bank of the river. There the landscape is dominated by the ghats on the riverfront by the temples on either side and in midstream by the kund of great sanctity in the Godavari bed. The area, even today breathes religion and around the religious buildings stand the ancillary structures such as dharamshala, priestly homes, and strings of retail shops all serve the visiting pilgrims. Behind this river belt stand old and crowded house almost leaning on the narrow lanes with a temple here and there, and shopping extensions which formed the old commercial core with its artistic copper brass and silverware. Priests, baniyas (businessman) and artisans are permanent residents. Some urban renewal has taken place but crowding of old house structures and overcrowding by population are the two principal characteristics.

https://altamash.myportfolio.com/nashik

 
 
 

Nashik; is also spelt as Nasik, situated in the northern part of Maharashtra. Nasik is one of the most important cities of Maharashtra. The city is the centre of attraction for its beautiful surrounding and cool and pleasant climate. The History of Nashik is known for its mythological, historical, social, and cultural importance. It is one of the four cities that host the massive Sinhastha Kumbh Mela once every twelve years. River Godavari flows through the city; the temple Ghats on the bank of river Godavari; makes Nashik one of the holiest places for Hindus all over the World. City Nasik is surrounded; by nine hills, namely: Durga, Ganesh, Chitraghanta, Pandav, DingerAli, Mhasarul, Jogwada, Pathanpura, and Konkani.

Since the ancient period, it had been a seat of commerce and trade in India. The archaeological excavation had found that the territory around Nashik; was occupied in the early Stone Age. Archaeological sites like Pandu (Buddhist) and Chamar (Jain) temple cave; is situated in Nasik.

The history of Nashik has jotted down different names of the city during the different yugas. During the Satya Yuga, it is known, with the name of ‘Padmanagar’, during the ‘Tetra Yuga’ period, it is known, with the name of ‘Trikantak’, during the ‘Dvapara Yuga’ period it is known with the name of ‘Janasthana’, and ultimately during the ‘Kali Yuga’ period, it is known with the name of ‘Navashikh’ or ‘Nashik’. The city got its present name in the year 1818 CE when the Peshwas got hold of this city. Peshwa controlled this city for a short period, and later this city moved into the hands of the British Empire. When the Mughal grab this city, they named this city Gulshanabad due to its beauty. But, when Maratha regained this region in the year 1752, they renamed this city Nashik.

We can find the reference to the history of  Nashik in Ramayana. In the Indian epic like Ramayana, Nasik; is also named ‘Panchavati’. When Lord Rama and Sita; was asked to leave Ayodha by Rama’s step-mother Kaikayi they both left. However, the love of elder brother Rama, Laxman also left Ayrodha with both these couples in exile for 14 years.

Rama, Sita, and Laxman stayed at Panchvati for some time due to this Panchavati, had gained holy importance. Panchavati got its name from five Banyan (Vad) tree because of the five great banyan trees, which grew there. Panchavati was a place where this trio made their home for exile. During their exile period Shoorpanaka, the sister of demon Raavan, tried to seduce Ram. Angered Ram; ordered Laxman to cut off the nose of Shoorpnaka and the city got its name as Nashik. There is a belief that Lord Vishnu defeated three demons here; hence the city; is also named ‘Tri-Kantak’.

Throughout the history of Nashik, The city was ruled; by many dynasties like the Mauryan Empire, Satvahanas, Abhiras, Traikutakas, Vishnukundins, Kalachuris, Chalukyas, Chalukyas of Badami, Rashtrakutas Dynasty, Yadavas.

Satavahana Rule in Nashik (207 BC – 199 CE)

After the death of Emperor Ashok, the Satavahana Empire came into power. The Satavahana Empire ruled Nashik during the rule of king. During the later period, many Satavahana territories like Malwa, Nashik, Kathiawar of Maharashtra, conquered by king Shaka of Western Kshatrapas. King Nahapana of Western Kshatrapas; had also ruled; the parts of Konkan, Poona, Nasik, and some other districts of Maharashtra, and some portion of Central India, as far north as Ajmer. It was king Nahapana who had excited Pandav-lene in Nashik. Satavahan Empire again got the hold on Nashik during the reign of Gautamiputra Satakarni. The Gautamiputra Satakarni of Satavahana Empire defeated Nahapana of Western Kshatrapas and brought the territory of Nashik under his control. After Gautamiputra Satkarni, his successor Yajnashri Satakarni was the most noteworthy ruler of the Satavahana Empire.

 Rise of Abhiraka Dynasty (220 CE – 377 CE)

After the fall of the Satvahana Empire, Abhiraka Dynasty came into power. The Abhirakas ruled around 67 years; they ruled the northeast and the Chutes in Maharashtra and Kuntala. King Ishvarasena, son of Shivadatta, was the founder of the Abhira dynasty.

Traikutakas

The Traikutakas dynasty took their name from the mountain Trikuta, which borders the Nashik district on the west. The three Traikutakas kings are Indradatta, Dahrasena, and Vyaghrasena, known from the inscription and the coins found in Nasik district and Gujarat. The mention of Trikutas; are found in Kalidasa Raghuvamsa, in which they are located, in Nothern Konkan.

Vishnukundis

During the 6th century, when the Vakataka dynasty started diminishing, King Madhavavarman I of Vishnukundins occupied the Vidarbha region. Madhavavarman I; married the daughter of the last ruling king of the Vakataka dynasty; Harishena I. He took advantage of the weakness of the Vakataka Dynasty and extended his dominion far and wide. King Madhavavarman I performed many sacrifices, including eleven Ashvamedha. During his rule, he brought the region of Western Maharashtra under his control.

Kalachuri (550 CE-573 CE)

The Vishnukundins king was thrown out of Maharashtra and Vidarbha by the Kalachuri king Krishnaraja; in the year 550 CE. King Krishnaraja had ruled from Mahishmati, modern Maheshvara, in the former Indore State. Krishnaraja; was succeeded by his son Shankaragana; he extended his kingdom from Malva to Nasik and Aurangabad district in the south. After Shankaragana, his son Buddharaja Succeeded him. Buddharaja after sitting on the throne; involved in the struggle with Chalukya king Mangalesha on the southern frontier of his kingdom soon after his accession.

Some important points about Nashik

  • Nashik is also known as Mini-Maharashtra because of its Climate and soil condition.
  • Lord Rama lived in Nashik during his exile, today this place is well known as Panchavati.
  • The Godavari river originates from Trimbakeshwar in Nashik and One of the 12 Jyotirlingas also at Trimbakeshwar
  • Nashik Satyagraha launched under the leadership of Dr Babasaheb Ambedmar for the entry of Dalit in Kalaram Temple was held in Nashik in 1930.
  • In 1931, a meeting of the Bombay Province Charmkar Parishad was organised in Nashik to work out the Chambhars’ position with regard to the Second Round Table Conference in which Babasaheb was going to participate.
  • In 1932, Babasaheb organized his temple entry movement for the abolition of untouchability in Nashik.
  • Nashik has to its credit many well known and towering personalities like Veer Sawarkar, Anant Kanhere, Rev. Tilak, Dadasaheb Potnis, Babubhai Rathi, V.V. Shirwadkar and Vasant Kanetkar.
  • In 1615 CE, This city was captured by Moguls (Kaustubh Shimpi) from Nijamshah Sultan & named “Gulshanabad”.
  • 1734: The ‘Gulshanabad’ city was given the name ‘NASHIK’.
  • 1864: Nashik Municipality formed
  • 1869: Nashik district formed.
 https://www.mintageworld.com/blog/history-of-nashik/
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

मंडपेश्वर शैव लेणी - हेरिटेज वॉक

https://www.maayboli.com/node/87769
मंडपेश्वर शैव लेणी

भारतीय इतिहास संकलन समिती कोकण प्रांत, बोरिवली भागआरंभ हेरिटेज यांनी 'मंडपेश्वर शैव लेणी हेरिटेज वॉक' आयोजित केला आहे हे कळल्यावर, काहीही हि करून हा वॉक चुकवायचा नाही हे आधीच ठरवून झाले होते. या वॉक ची वेळ सकाळी आठ ते अकरा अशी असल्यामुळे अतिशय उत्साहात सकाळी साडेसहा वाजताच घरातून निघाले. रविवार त्यामुळे मेगाब्लॉक ठरलेला, उशिर होऊ नये म्हणून वेळेत निघाले.

बरोबर आठ वाजता मंडपेश्वर च्या आवारात पोहोचले. पूर्वी दहिसर ला राहत असल्यामुळे लहानपणी खूप वेळा तिथे जाणे झाले होते शक्यतो त्रिपुरी पौर्णिमेला दिव्यांची आरास बघायला. या मंदिरात लहानपणी जायला आवडायचे पण मग नंतर आवारात टायर दुरुस्तीचे काम वैगरे चाले, आवारात जुन्या गाड्या, दारुडे-रिकामटेकडे लोक दिसायचे प्रमाण वाढले तसे इकडे फिरकणारे सामान्य लोक कमी झाले.

आठ फेब्रुवारी ला या आवाराचे बदललेले रूप बघितले आणि खूप आनंद झाला. हे जर आधीच झाले असते तर असेही मनात आले पण म्हणतात ना देर आये दुरुस्त आये. त्यामुळे आपल्या आवडत्या मंडपेश्वर मंदिराचे बदललेले रूप पाहून उत्साह दुणावला. मंडपेश्वर येथील लेण्यांची माहिती, इतिहास अभ्यासक नवीन म्हात्रे यांच्याकडून घेत असताना या बदललेल्या रूपाच्या मागे भारतीय इतिहास संकलन समिती बोरिवली भाग व मंडपेश्वर गुंफा सेवा ट्रस्ट यांचा मोठा सहभाग आहे हे कळले आणि या संस्थांबद्दल चा आदर अजूनच दुणावला. वॉक सुरु करायच्या आधी गरमागरम चविष्ट उपमा आणि चहा सोबत सगळ्यांच्या ओळखी करून घेतल्या.

नवीन म्हात्रे यांनी त्यांच्या ओघवत्या शैलीत लेण्यांचा इतिहास, मुंबईत आढळणाऱ्या लेण्या यांचा आढावा घेतला आणि आम्ही सगळेच त्यात गुंतून गेलो . मुंबईत कान्हेरी, मंडपेश्वर , मागाठाणे , महाकाली आणि जोगेश्वरी इथे लेण्या आहेत. कान्हेरी आणि महाकाली लेणी या बौद्ध लेण्यांसाठी प्रसिद्ध आहेत तर मंडपेश्वरची लेणी शिवलेणी म्हणून प्रसिद्ध आहे.

मंडपेश्वर मंदिरा च्या बाहेर मोठे पटांगण आहे. मंदिराच्या दिशेने चालत गेल्यास समोर दगडात कोरलेल्या पायऱ्या आणि वर चढून गेल्यावर नंदी आहे. पूर्वी पायऱ्यांच्या दोन्ही बाजूला सिंह किंवा तत्सम प्राण्याचे शिल्प होते कारण आता फक्त धारधार नखे असलेला पंजा शिल्ल्क आहे आणि वर भग्न अवस्थेतील शिल्प. प्रत्येक ठिकाणी भग्न अवशेष आहेत जे बघून वाईट वाटते. लेण्याच्या दर्शनी भागात चार खांब आहेत, मागे सभामंडप आणि दोन बाजूला वऱ्हांडे आहेत. सभामंडपाच्या मध्यभागी शिवमंदिर आणि दोन बाजूस दोन लहान गुंफा आहेत. या गुफांना जोडून मोठ्या आकाराच्या खोल्या आहेत. या खोल्यांचा वापर सामान ठेवण्यासाठी केला जात असे.

गर्भगृहातील शिवलिंग अलीकडच्या काळात स्थापन केलेले आहे. डावीकडच्या गुंफेत शिवतांडवाचे भव्य शिल्प आहे, भग्न अवस्थेतील शिल्प पाहून वाईट वाटले. नवीन म्हात्रे यांनी बारकाईने आम्हाला ते शिल्प दाखवले. या शिल्पातील शिवाला आठ भुजा आहेत. शिवतांडव पहाण्यासाठी आकाशात यक्ष, गंधर्व आलेले आहेत तसेच ब्रह्मदेव , विष्णू आणि गणेश हे हि आपल्याला दिसतात. बाजूच्या भिंतीवर लकुलीश चे शिल्प आहे.

लकुलीश बद्दल मला काहीच माहिती न्हवती. असे म्हटले जाते कि शिवाच्या अठरा अवतारांपैकी लकुलीश हा पहिला अवतार आहे. शिल्पात त्यांच्या हातात दंड (लकुल) धारण केलेले दिसते . पोर्तुगीजांनी या मंदिराचे रूपांतर चॅपल मध्ये करताना नटेश्वराची मूर्ती पूर्णपणे भग्न न करता आल्यामुळे त्यावर लाकडाच्या फळ्या ठोकल्या होत्या त्यामुळे वरच्या भागात चौकोनी खोबण्या दिसतात. उंबरठ्याचे दोन खांब तोडण्यात आले आहेत त्यामुळे त्या भागाचे स्वरूप एका स्टेज सारखे करण्यात आले. बाहेरच्या डाव्या भागातल्या एका मूर्तीचे रूपांतर क्रॉस मध्ये करण्यात आले आहे. पण उजव्या बाजूची मूर्ती तशीच आहे. काही शिल्पांपुढे भिंती बांधण्यात आल्यामुळे ती शिल्पे सुरक्षित राहिली आहेत.

सभामंडपात नंदीच्या वर छतावर एक वर्तुळ कोरलेले आहे . काही खांबांवरही सुरेख नक्षीकाम दिसते जे बघून पूर्वीच्या काळात किती सुरेख नक्षीकाम केले असेल याची प्रचिती येते. पेशव्यांनी पोर्तुगिजांकडून वसई ताब्यात घेतल्यावर मंडपेश्वर हि ताब्यात घेतले. या लेण्यांमध्ये शिवलिंग असल्यामुळे अनेक भाविक दर्शनाला येतात तरीही काही प्रमाणात हि लेणी दुर्लक्षित राहिली आहेत. गुंफांच्या वरच्या भागात पोर्तुगीज कालखंडातील चर्च चे अवशेष अजूनही आहेत. लेण्यांच्या आवारातून हे अवशेष पाहण्यासाठी वर चढून जाता येते .

या लेण्या रस्त्याला लागूनच आहेत तरी फारसे तिकडे कुणी जात नसे. पण मंदिराचे आवार संरक्षित केल्यामुळे आता वर्दळ वाढली आहे. इतिहास अभ्यासक नवीन म्हात्रे यांची माहिती सांगण्याची पद्धत खूप छान आहे. त्यांच्या सोबत या शिल्पांमधील बारकावे पाहण्याची नवीन दृष्टी मिळाली.

बोरिवली रेल्वे स्थानकावरून रिक्षाने येथे सहज पोहोचता येते. शक्य असल्यास या लेण्या बघून या कारण या प्राचीन ऐतिहासिक लेण्यांपैकी एक असून, मुंबईच्या इतिहासातील महत्वाच्या साक्षीदार आहेत .

काही फोटो
mandapeshwar00.jpeg

खांबावरचे नक्षीकाम
mandapeshwar02.jpegmandapeshwar03.jpegmandapeshwar04_0.jpeg

गुंफांच्याच मागच्याच बाजूला आय सी चर्च आहे. त्याचाही इतिहास इंटरेस्टिंग आहे.
https://icchurchborivali.org/about-history.html
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

मनसर

 प्रकार : गिरीदुर्ग जिल्हा : नागपुर उंची : १२०० फुट ...