जगन्नाथ पुरीचा इतिहास :-
जगन्नाथ पुरीला हिंदु पुराणानुसार शाक क्षेत्र, शंखक्षेत्र, श्रीक्षेत्र, पुरुषोत्तम क्षेत्र, नीलांचल आणि नीलगिरी अशी नावे आहेत.प्राचीन काळी हा भुभाग उत्कल म्हणुन ओळखला जात होता. इथे महत्वाचे बंदर होते आणि इथून जावा, सुमात्रा, इंडोनेशिया, थायलँड आणि इतर देशांशी व्यापार होत होता. हिंदू धर्मात अतिशय पवित्र मानल्या गेलेल्या या जगन्नाथ पुरीला पुराणात श्रीक्षेत्र वा पुरुषोत्तम क्षेत्र असेही म्हटल्या गेले आहे. हे मंदिर ज्या ठिकाणी आहे त्या ठिकाणाचा आकार शंखासारखा आहे म्हणून या ठिकाणाला शंख क्षेत्र असेही म्हटले जाते. प्राचीन काळापासून देवता भगवान नीलमाधव यांची पुजा करित होते.नीलांचल पर्वत भुमीमध्ये समाविष्ट झाल्यावर भगवान नीलमाधव यांची मुर्ती या पर्वतावर आणली व इथे स्थापन करुन त्याची पुजा करु लागले. त्यामुळे या ठिकाणाला नीलांचल पर्वत नाव मिळाले.


कॅमेरा, मोबाईल, टोप्या, कमरपट्टा, चामड्याची कोणतीही वस्तु निषिद्ध आहे.
अहिंदूंसाठी बाजूच्या इमारतीतील रघुनंदन ग्रंथालयाच्या गच्चीतून सोय केली जाते.
दूरध्वनी: ०६७५२-२२२००१-०२
मुख्य द्वाराचे नाव स्वर्गद्वार असे अर्थपूर्ण आहे. गर्दी होऊं नये म्हणून सावधगिरी म्हणून भक्तांना पटापट दर्शन देऊन ढकलून दूर केले जाते.
जगन्नाथ अर्चना मंदिरात १५५८ पर्यंत सुरू राहिली. याच वर्षी बंगालचा सेनापती काला पाहाडने ओडिशा वर हल्ला केला आणि मूर्ती आणि मंदिराचे काही भाग नष्ट केले. पूजा बंद केली आणि चिलिका तलावातील एका बेटावर देवतांना गुप्तपणे ठेवण्यात आले. नंतर रामचंद्र देब यांनी खुजडा येथे स्वतंत्र राज्य स्थापन केल्यानंतर मंदिर व त्यातील मूर्ती पुनर्स्थापित केल्या.

अनेक वर्षे इथे मुघलांनी राज्य केले. इथून मिळणाऱ्या यात्रा कराच्या उत्पन्नामुळे त्यांनी जगन्नाथ पुरीकडे वक्रदृष्टी फिरवली नाही. पण कट्टर धर्मवेडा औरंगजेब जेव्हा सत्तेत आला तेव्हा त्याने हिंदूधर्म स्थळांची विटंबना करण्यास सुरवात केली. त्याने आपल्या ओरिसामधल्या अधिकाऱ्यांना जगन्नाथाच मंदिर फोडायचा फर्मान काढला होता. पण कसंबसं तिथल्या पुजाऱ्यांनी या अधिकाऱ्यांना लाच देऊन मंदिर वाचवलं.याच काळात औरंगजेब बादशाह दक्षिणेत मराठ्यांशी युद्धाच्या धामधुमीत गुंतला होता त्यामुळे त्याच त्याच्या आदेशाकडे दुर्लक्ष झालं. यामुळे अप्रत्यक्षरित्या मराठ्यांमुळे जगन्नाथ पुरीचं रक्षण झालं.पण औरंगजेबाच्या मृत्यू पर्यंत हे मंदिर बंदच राहिलं.
पुढे शंभूपुत्र शाहू महाराज छत्रपती बनले आणि मराठा राजसत्तेला स्थैर्य आलं. पेशव्यांनी महाराष्ट्रात कारभाराला घडी बसवली. याच स्थैर्यामुळे बाजीराव पेशव्याच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्राबाहेर मराठी घोडे दौडू लागले.होळकर शिंदे अशा पराक्रमी सरदारांच्या मुळे संपूर्ण भारतभरात मराठ्यांचा वचक निर्माण झाला. रघुनाथराव पेशव्याने तर अटकेपार झेंडा लावला.नागपूरच्या बेरार प्रांतात रघुजी भोसलेंचा उदय झाला होता. याच काळात शेजारच्या बंगाल प्रांतामध्ये मात्र परिस्थिती गोंधळाची होती. तिथला नवाब अलीवर्दी खान याच्यावर त्याचे सरदार नाखूष होते. अशाच एका नाखूष सरदाराने मीर हबिबने नागपूरच्या भोसल्यांना अवतान धाडले. सुरवातीला रघुजी भोसल्यांनी भास्कर पंडितच्या नेतृत्वाखाली सैन्य देऊन बंगाल प्रांतात पाठवलं. भास्कर पंडित आणि त्याच्या सैन्याने तिथल्या मुघल व्यापाऱ्यांची लूट आणली. तेव्हा ओरिसा बंगाल प्रांताचाच भाग होता.जवळपास १० वर्षे मराठ्यांच्या धाडी बंगाल आणि ओरिसा मध्ये सुरू असायच्या.मराठा सैनिकांची दहशत एवढी मोठी होती की तिथल्या आया आपल्या मुलांना झोप नाही तर मराठा येतील या कथा सांगायच्या.
रघुजी भोसलेंनी बंगालच्या नवबाला एवढे जेरीस आणले की अखेर त्याने मराठ्यांशी तह केला आणि ओरिसाचा हिस्सा त्यांच्या कडे सोपवला. हे वर्ष होत १७५१. जवळपास दीडशे वर्षांनी ओरिसामधली परकीय राजवट संपुष्टात आली होती.मराठ्यांच्या हातात सत्ता आल्यावर अनेक बदल घडवून आणले. अनिल धीर या अभ्यासकांच्या मते मराठ्यांनी ओरिसाच्या राजकारभाराची घडी बसवली. बऱ्याच काळानंतर या भागात स्थैर्य व शांतता लाभली होती. रघुजी भोसलेंनी अनेक मंदिरांचा जीर्णोद्धार केला. जगन्नाथपुरी मंदिराकडे विशेष लक्ष दिले. या मंदिराला दानधर्म केला. इथल्या पूजेसाठी जमिनी दान दिल्या. रघुजी भोसले यांची आई चिमाबाई हिने देवाला मोहनभोग चढवण्याच्या परंपरेला सुरवात केली.मराठ्यांनी ब्रजदेव गोस्वामीना इथला मठ प्रमुख बनवलं. एका मराठी गोसावीने सोन्या चांदीच्या मूर्ती दान दिल्या.

रघुजी भोसलेंनी जगन्नाथपुरीची रथयात्रा धुमधडाक्यात साजरी करण्यास सुरवात केली. या यात्रेसाठी मोठा निधी दिला जाऊ लागला. यात्राकरातून येणारा पैसाही मंदिराच्या विकासासाठी वापरला जात होता.
रघुजी भोसलेंच्या नंतर आलेल्या मराठा सुभेदारांनी देखील जगन्नाथ मंदिराची व्यवस्था चोख ठेवली. इतर अनेक जमीनदारांना राजा महाराजांना जगन्नाथाला जमिनी दान देण्यास भाग पाडलं. मराठ्यांनी कोणार्क मधून अरुण स्तंभ उखडून जगन्नाथ पुरीच्या मंदिरात उभारला. अस म्हणतात की, जगन्नाथ मंदिरातील दुसरी महत्वाची झुलना ही यात्रा मराठ्यांनी सुरू केली. या यात्रांना भारतभरातून भाविक गर्दी लागले याच प्रमुख कारण म्हणजे इथे असलेल मराठ्यांच राज्य.त्यांच्या पराक्रमाने आपल्या धार्मिक कार्याला संरक्षण आहे ही समजूत दृढ झाली.मराठ्यांमुळे कोणत्याही धर्मांध राजसत्तेला जगन्नाथ मंदिराकडे पाहण्याची टाप नव्हती. फक्त मंदिरच नाही तर मराठ्यांनी संपूर्ण ओरिसाचा विकास घडवून आणला. पुरीला बंगालशी जोडणाऱ्या जगन्नाथ सडकची निर्मिती केली.राजाराम पंडित आणि सदाशिवराव पंडित अशा अनेक सुभेदारांनी अनेक ठिकाणी रस्ते, धर्मशाळा,विहिरी उभारल्या. यात्रेकरूंना सोईसुविधा बनवल्या. करांमध्ये सुधारणा केली, शेतीवर विशेष लक्ष पुरवले. जमिनीचे रेकॉर्ड बनवले.मराठ्यांनी बनवलेल्या सैनिकांच्या बराकी आजही ओरिसामध्ये उभ्या असलेल्या पाहायला मिळतात.
आज अनेकदा बंगाली इतिहासकार मराठ्यांच लुटारू म्हणून चित्र रंगवतात पण याच मराठी राजसत्तेने ओरिसाला आपल्या पायावर उभे केले होते हा इतिहास त्यांच्या नजरेत येत नाही.पुढे दुसऱ्या रघुजी भोसलेंनी इंग्रजांशी करार करून या प्रांतावरील हक्क गमावला. मराठ्यांचे राज्य संपुष्टात येताच सर्व प्रथम इंग्रजांनी जगन्नाथाच्या मंदिरावर हल्ला करून तिथला खजिना लुटला.

एका पुराणकथेनुसार असं म्हटलं जातं जेव्हा जगन्नाथ मंदिराची स्थापना झाली तेव्हा प्रत्येक भक्तांची देवाचं दर्शन घेण्याची इच्छा होती. असाचं समुद्र देखील एक भगवान जगन्नाथ यांचा भक्त होता. त्यामुळे समुद्राने जगन्नाथ मंदिराला तीन चार वेळा भेट दिली आणि त्यामुळे मंदिराचा नुकसान व्हायचं. म्हणूनच एकदा भगवान जगन्नाथ यांनी भक्त हनुमान यांना समुद्रावर लक्ष ठेवायला पाठवलं.
तेव्हा हनुमान यांनी समुद्राला बेडींनी बांधून ठेवलं तेव्हा समुद्राने हनुमानाला विचारलं तुम्ही पण तर त्यांचे भक्त आहात तुम्हाला नाही होत का इच्छा त्यांनच दर्शन करण्याची. तेव्हा हनुमान यांनी भगवान जगन्नाथ यांना भेट देण्याचं ठरवलं तेव्हा हनुमान यांच्या सोबत समुद्र देखील भेट देण्यासाठी आले. हे दोघं बेडीने बांधले असल्यामुळे हनुमान जेव्हा जेव्हा भगवान जगन्नाथ यांनाच दर्शनासाठी यायचे तेव्हा तेव्हा समुद्र सुद्धा त्यांच्या सोबत जायचा. यामुळे मंदिराचे नेहमीच नुकसान व्हायचं त्याचमुळे भगवान जगन्नाथ यांनी हनुमान आणि समुद्र दोघांना स्वर्ण बेडीने बांधून ठेवलं आणि हेच कारण आहे ज्यामुळे जगन्नाथ पुरी येथील समुद्र नेहमी शांत असतो.











ध्वज फडकतो उलट दिशेने

ध्वज दररोज बदलतो
या मंदिरावरचा कापडी ध्वज रोज संध्याकाळी बदलतात. एका विशिष्ट कुटुंबातील माणसेच पिढ्यानपिढ्या हे काम करत आलेली आहेत. दररोज एक याजक मंदिराच्या घुमटाच्या वरचा ध्वज बदलण्यासाठी ४५ मजल्यांच्या इमारतीच्या उंचीसह मंदिराच्या भिंतींवर चढतो. खरं तर हे जरा कठीणच आहे, परंतु मंदिर बांधल्यापासून हा विधी सतत चालू आहे. या प्रक्रियेस कोणत्याही संरक्षणात्मक साधनाचा वापर न करता याची दररोज पुनरावृत्ती केली जाते. असा विश्वास आहे की जर दिनदर्शिकेतील एका दिवसासाठीही हा विधी वगळण्यात आला, तर मंदिर १८ वर्षांसाठी बंद राहील. इतक्या उंचावर त्या माणसाला चढून जाताना आणि ध्वज बदलताना बघून जरा भीतीच वाटते, पण त्यांच्यासाठी तो सवयीचा भाग असणार. 

पक्षी उडत नाहीत
आपण पक्षी आपल्या डोक्यावर नेहमी विश्रांती घेत आणि उडताना पाहतो. परंतु, या विशिष्ट क्षेत्राला पक्षी उडत नाहीत. मंदिराच्या घुमटाच्या वर एकही पक्षी नाही, अगदी विमानदेखील मंदिराच्या भोवती फिरत नाही. ह्या मंदिरामुळे निर्माण होणाऱ्या कर्मन व्हॉर्टेक्स्ट इफेक्टमुळे कदाचित पक्षी सुद्धा उडण्यास कचरत असावेत असा एक अंदाज आहे. कारण प्रत्येक पक्षी हा हवेच्या प्रवाहाच्या बदलांबाबत अतिशय ज्ञानी असतो. कदाचित ह्या शिखराच्या आजूबाजूला हवेत होणाऱ्या बदलांमुळे उडण्याची क्रिया करण्यासाठी त्यांना अडचण येतं असावी. त्यामुळेच ह्या शिखराच्या आसपास पक्षी उडताना दिसत नाहीत.

शांत पाणी
मंदिराच्या सिंघ दारातून प्रवेश करताच कानावर आदळणारा लाटांचा आवाज अचानक नाहीसा होतो. जेव्हा आपण पुन्हा बाहेर पडू तेव्हा लाटांचा आवाज आपल्या कानावर पडतो. असं होण्यामागे मंदिराच्या निर्माणात वापर केलेल्या दगडी तंत्रज्ञानांचा समावेश आहे. इकडे दगड असे वापरले गेले आहेत की ज्यामुळे बाहेरून येणाऱ्या ध्वनीलहरी आतमध्ये शिरत नाहीत. त्यामुळे मंदिराच्या सिंहाच्या प्रवेशद्वारापासून आत शिरताच आपल्याला अचानक आवाज नाहीसा झाल्याचा अनुभव येतो. मंदिर सोडल्यावर आवाज परत येतो. स्थानिक आख्यायिकेनुसार मंदिरातील प्रवेशद्वारांत शांती मिळावी अशी दोन राजांची बहीण सुभद्रा मेची इच्छा होती. म्हणूनच त्याची इच्छा पूर्ण झाली जी आजही अबाधित आहे.

मदिराभोवतालच्या बाजार विभागातील शेकडो दुकानातून जगन्नाथाचा बंधू बलभद्र म्हणजे बलराम आणि भगिनी सुभद्रा यांच्या समवेत जगन्नाथ असलेल्या त्रिमूर्ती विकत मिळतात. वैशिष्ट्यपूर्ण ओदिशी शैलीतले टप्पोरे डोळे असलेल्या त्रिमूर्ती. जगन्नाथ संप्रदायाचे प्राबल्य ओदिशातील इतर भागातून पर्यटन करतांना देखील जाणवते. पाहावे तिथे जगन्नाथाची मूर्ती दिसते. मोहक आकार आणि दृष्टी खिळवणारे सामर्थ्य यांच्या संयोगामुळे असेल कदाचित पण अगदी धार्मिक नसणार्या नजरेला देखील जगन्नाथाची मूर्ती आकर्षक वाटते.
अगदी हिंदू नसणार्या पर्यटकाला देखील या अलोट गर्दीच्या यात्रास्थानाचे सामर्थ्य जाणवते. मंदिराभोवतालची दुकाने गर्दीने फुलून गेलेली असतात. पण या अलोट गर्दीतही जाणवते ते सौजन्य आणि पावित्र्य. दिवेलागण होताहोताच बाजारात एक फेरफटका मारा. घाबरू नका, तुमच्या टॅक्सीच्या किंवा रिक्षाच्या चालकाची नजर तुमच्यावर असेल आणि तुम्ही निघतांना तो जादू केल्यासारखा बरोब्बर अवतीर्ण होईल. विष्णुदेवतेचा ध्वज वार्यावर फडकत असलेल्या भव्य आणि सुंदर कळसाकडे एक नजर टाका. मंदिरात प्रवेश करणार्या आणि मंदिरातून बाहेर येणार्या भाविकांचे चेहरे जरा न्याहाळून पाहा. तळल्या जाणार्या खाऊचा, मिठाईचा, अगरबत्त्यांचा, फुलांचा आणि धुपाचा संमिश्र गंध श्वासात भरून घ्या आणि पावले वळतील तिथे जा. अगदी निधर्मी व्यक्तीला पण वाटेल की आपण वैशिष्ट्यपूर्ण अशा एकमेवाद्वितीय यात्रास्थानी आलेलो आहोत.
१. कोणत्याही पुजार्याला जवळ येऊ देऊ नका. काही पुजारी देखील चोर आणि खिसेकापू आहेत तर काही चोर - खिसेकापू पुजार्यांच्या वेषात उपस्थित असतात. फक्त मंदीर-अधिकृत पुजार्यांशी व्यवहार करा. आपल्या वस्तूंची चोरीपासून काळजी घ्या.
२. कॅमेरे,भ्रमणध्वनी आत न्यायला परवानगी नाही. तेव्हा ते बरोबर घेऊ नका.
३. फक्त हिंदूंना प्रवेश. इतर धर्मीयांना बाजूच्या इमारतीतून अवलोकन करायची सोय आहे.
४. दोन तासात बसमध्ये परत या.
५. पुरीच्या मंदिरातील कोरीवकाम निवांतपणे पाहणे अशक्यच आहे.
रोहिणी कुंड हे मंदिराच्या आवारातच आहे. पंचतीर्थांपैकी हे एक तीर्थ आहे. बनारसप्रमाणे पुरीला देखील पंचतीर्थे आहेत. रोहिणी कुंड हे मंदिराच्या आवारातच विमला मंदिरासमोर आहे. पुरीच्या पंचतीर्थांपैकी हे एक तीर्थ आहे. श्वेतगंगा, नरेंद्र सरोवर, इंद्रद्युम्न सरोवर, मार्कंडेय सरोवर आणि तीर्थराज महानदी म्हणजे पुरीचा समुद्रकिनारा यापैकी इतर चार तीर्थे आहेत. या पंचतीर्थांत स्नान केल्यामुळे पापक्षालन होते असे भाविक मानतात. साहाजिकच इथे येण्यापूर्वी मनसोक्त पापे करण्यास हरकत नाही.
रोहिणी कुंडातील जल हे करण जल म्हणजे पापक्षालन करून आपल्याला पावन करणारे आहे असे मानतात.
पवित्र अशा शंख क्षेत्रात हे कुंड वसलेले आहे. या पवित्र अशा रोहिणी कुंडात एकदा एक देवदाराचा लाकडी ओंडका तरंगतांना मिळाला. या ओंडक्यातूनच मूळची जगन्नाथाची मूर्ती कोरून तिची प्रतिष्ठापना पुरीच्या मुख्य मंदिरात केली होती. त्या मूळ मूर्तीबरहुकूमच सध्याची मूर्ती कोरली आहे.
विमला, कमला सर्वमंगला आणि उत्तराई अशा चार देवींनी प्रणितोदक कुंड, दोन वृक्ष स्थळे गरुड आणि निलगिरी पर्वताचे शिखर या ठिकाणांबरोबरच रोहिणी कुंडापाशी वास्तव्य केले.

नरेंद्र सरोवर.
मूळचे रोहिणी कुंड विमलादेवी मंदिराच्या प्रवेशापाशी आहे. त्या कुंडात निर्माणजल आहे असे म्हणतात. कैक वर्षापूर्वी ते कुंड जराजर्जर झाले. परंतु सन २००७ मध्ये दीन बंधु दास या श्री प्रभुपादस्वामींच्या शिष्याने एक लेख सन या नियतकालिकामध्ये लिहिला आणि कुंडाच्या दुरुस्तीसाठी आर्थिक मदत करण्याचे आवाहन केले.सध्या जगन्नाथ मंदिरात रोहिणी कुंड म्हणून एका छोट्याशा पात्रात पवित्र जल ठेवलेले आहे. पात्राच्या तळाशी भुशुंडी काक याची मूर्ती ठेवलेली आहे. एका पुराणकथेनुसार एक कावळा रोहिणी कुंडात पडला आणि अचानक त्याचे रूपांतर विष्णूनारायणाच्या शंखचक्रगदापद्मधारी अशा चतुर्भुज भक्तात झाले. तो हा भुशुंडी काक = कावळा.
स्कंदपुराणात देखील ‘भुशुंडी काक’ची कथा सांगितली आहे. मोमस ऋषींनी भुशुंडीला एक शाप दिला. मरणासन्न अवस्थेत उडत उडत तो कावळा शंखक्षेत्री पोहोचला. रोहिणी कुंडातील पवित्र जलाने स्नान करून तो जगन्नाथाचे दर्शन घ्यायला मंदिराजवळ आला. योगायोगाने तो एका कल्पवटवृक्षाच्या शाखेवर बसला. आपल्याला ठाऊकच आहे की कल्पवृक्षाखाली मनांत धरलेली इच्छा पूर्ण होते. त्या कावळ्याच्या मनांत शापमुक्त व्हावे अशी इच्छा सतत तेवत होतीच. अचानक कावळ्याच्या रूपातील भुशुंडी मरून रोहिणी कुंडात पडला आणि त्याचे रूपांतर चतुर्भुज अशा दिव्य रूपात झाले. तेव्हापासून त्याची वटनारायण म्हणून पूजा करतात.
रोहिणीकुंडाच्या जरा पुढे गेले की सुदर्शनक्राच्या आकाराचे नाभिचक्र आहे. त्याच्या बाजूला चार फूट उंचीची कावळ्याची मूर्ती आहे. हा कावळा इंद्रद्युम्नाच्या काळी अस्तित्वात होता. जगन्नाथाचे मंदीर बांधून पूर्ण झाल्यावर त्याला त्याच्या पवित्र अशा गतकाळाचे फळ मिळाले. राजा गलमाधवाने दावा केला की मंदीर त्याचे आहे. मग ब्रह्माने तिथे येऊन तोडगा काढला. राजा इंद्रद्युम्नाशेजारी कावळा आणि चक्र हे साक्षीला ठेवले. गलमाधवाचा आत्मा अजूनही रोहिणी कुंडात वास्तव्य करतो आणि रोज जगन्नाथाची प्रार्थना करतो असे मानतात.
मूळ रोहिणी कुंड विशाल जलाशय होता. त्याच्या किनार्यावरून पाण्यात उतरायला स्फटिकाच्या पायर्या होत्या असा वेदांत उल्लेख आहे. स्कंदपुराणात विद्यापति नीलशैलहून परत आल्यानंतरचे संभाषण आहे. त्यात तो इंद्रद्युम्नाला म्हणतो,
नीलगिरीच्या शिखरावर एक सदाहरित असा वटवृक्ष आहे. त्या वृक्षाच्या पश्चिमेला रोहिणी कुंड आहे आणि कुंडाभोवती स्फटिक मणिमाला आहे. शंखचक्रगदापद्मधारी, नीलवर्णी इंद्रनीलमणिमाया, नीलमाधव हे वटवृक्षाच्या शीतल छायेखाली या वेदीवरील सोनेरी कमलावर आसनस्थ आहेत, नीलमाधव वेणुवादन करताहेत आणि अनंतनागाने त्यांच्या मागून आपल्या शरीराने छत्र धरले आहे. समोर सुदर्शन दृश्यमान आहे आणि त्यांच्या समोर गरूड हात जोडून बसलेला आहे.
नीलमाधव आणि इंद्रद्युम्न यांना या पवित्र जागी आलेले विद्यापतीने पाहिल्यानंतरच्या काळात नीलमाधवाची आणि रोहिणी कुंडाची ही प्रतिमा एका भयंकर अशा वादळात वाळूमध्ये आता नष्ट झाल्याचे मानतात. तथापि श्री नरसिंहाने एका अगुरू वृक्षाखाली या पवित्र स्थळी नीलशैलाचे मंदीर उभारले. नीलमाधव अंतर्धान पावल्यानंतर आता एवढेच राहिले आहे.
रोहिणीकुंडाच्या पूर्वेला आपल्याला थोर ऋषी मार्कंड यांच्या पावलाचे ठसे दिसतात. त्यावरून दुसर्या पंचतीर्थाचे नाव ठेवले, मार्कंडेय सरोवर.
श्री विमलांबा शक्तिपीठ :-
या मंदीराची स्थापना गोवर्धन मठाच्या शंकराचार्यांनी केली असे मानले जाते. सतीच्या मृत्युनंतर तीच्या शरीराचे पन्नास भाग विखरुन पडले, त्यातील नाभी स्थान इथे आहे, असे मानले जाते.

साखी गोपाल मंदीर :-
हे ओडीशातील एक महत्वाचे मंदीर आहे. इथल्या भगवान श्रीकृष्णाच्या मुर्तीची वैशिष्ट्य म्हणजे हि मुर्ती अत्यंत दुर्मिळ अश्या वज्र दगडापासून बनलेली आहे.

बाट मंगला मंदीर :-
पुरीच्या प्रवेशद्वारापाशी असलेल्या या मंदीरात मंगला देवीची मुर्ती आहे.

श्री गुंडीचा मंदीर :-
दरवर्षी भगवान जगन्नाथांची यात्रा भरते, तेव्हा जगन्नाथांचा रथ या मंदीरापाशी आला कि यात्रा पार पडली असे मानले जाते. जगन्नाथ मंदीरापासून हे मंदीर तीन कि.मी. वर आहे.

इंद्रध्युम्न सरोवर तीर्थ :-
गुंडीचा मंदिरापासून अर्ध्या कि.मी.वर हे सरोवर आहे.या सरोवराभोवती चार-पाच मंदीरे आहेत.

मौसी माँ मंदीर
या मंदीरामध्ये देवी अर्धासिनी देवीची मुर्ती आहे, त्यामुळे मंदीराला अर्धासिनी मंदीर म्हणतात. भगवान शिव आणि देवी अर्धासिनी हे जगन्नाथ पुरीचे रक्षण करतात अशी भाविकांची श्रध्दा आहे.
भक्ति सिध्दांत सरस्वरी प्रभुपाद यांच्या जन्मस्थानावर चैतन्यप्रभु यांनी या मंदीराची निर्मिती केली. भगवान श्रीकृष्णाचे विचार आणि महती याचा प्रसार व्हावा या उद्देशाने या मंदीराची निर्मिती करण्यात आली.

सिध्द महावीर मंदीर, पुरी :-
रमभक्त हनुमानाचे हे मंदीर गुंडीचा मंदीरापासून साधारण एक कि.मी. अंतरावर आहे.

रामचंडी हनुमान मंदीर :-
सीतामाईच्या शोधात लंकेला जाताना हनुमान या ठिकाणी माता रामचंडी देवी यांच्या सानिध्यात काही काळ थांबले होते अशी समजुत आहे. इथे हनुमानाची पंचमुखी मुर्ती आहे.
जगभर पसरलेल्या अनेक इस्कॉन मंदीरापैकी एक म्हणजे हे जगन्नाथ पुरीमधील इस्कॉन मंदीर. इथे भगवान श्रीकृष्णाबरोबरच भगवान जगन्नाथ, भगवान बलभद्र आणि देवी सुभद्रा यांच्या मुर्ती आहेत.
पुरीचा सोनेरी समुद्रकिनारा अर्थात गोल्डन बीच. भल्यामोठ्या फेसाळणार्या लाटांनी वातावरण जिवंत केलेले.किनारा तसा बर्यापैकी प्रशस्त रुंद. पण तुलना केली तर तसा अनाकर्षकच. असे दिसते की समुद्र जमिनीत घुसून किनारा चंद्राकृती झाला की दोन्ही बाजूंना जमिनीची माडांची भरगच्च गर्दी असलेली टोके आत घुसलेली असली, थोडेफार खडक समुद्रात दिसत असले तरच तो सुंदर दिसत असावा. कोकण, गोवा, केरळ वगैरे किनार्यापुढे हा अगदीच फिका वाटतो. विक्रेत्यांची गर्दी, कोलाहल अजिबात नसल्यामुळे निवांत वाटते.



कलाकाराचं गाव रघुराजपूर. जगन्नाथपुरी या सुप्रसिद्ध ठिकाणापासून अवघ्या १० कि.मी.वर असलेले हे अत्यंत सुंदर ठिकाण. ओडिशा सरकारने या गावाला ऐतिहासिक वारसा गाव असा दर्जा दिलेला आहे. सुप्रसिद्ध नर्तक केलुचरण महापात्र यांचे हे जन्मगाव. या गावात १२० घरं आहेत आणि सगळी मंडळी कलाकार. गावाच्या मधोमध मंदिरांची एक रांग आहे आणि त्याच्या दोन्ही बाजूला घरांच्या रांगा. शिल्पकार, चित्रकार, लाकडावर काम करणारे, रंगकाम करणारे आणि पट्टचित्र हे खास ओडिशाचे वैशिष्टय़ असलेली कला जोपासणारे असे सगळे लोक आहेत. इथे सगळ्या घरांवर बाहेरून सुंदर सुंदर चित्रकला केलेली. घराबाहेर मूर्ती करून ठेवलेल्या असे हे अगदी मनमोहक असे गाव आहे. पाहताक्षणी प्रेमात पडावे असे हे गाव. इथे बरेच परदेशी कलाकार शिकायला येतात त्यांची सोय गावाच्या एका टोकाला बांधलेल्या टुमदार बंगलीमध्ये केलेली असते. जगन्नाथ मंदिराच्या इतिहासाशी निगडित आणि तेवढीच पुरातन अशी ही कला आहे. उंदराच्या केसांचा ब्रश इथे अगदी बारीक चित्रे काढण्यासाठी मुद्दाम वापरला जातो. काही चित्रे मात्र अगदी हुबेहूब आपल्या वारली चित्रांसारखी दिसतात. साबुदाणा भिजवून त्याचा डिंक कापडाला लावून त्यावर कृष्णलीला, रामायण, महाभारत आणि जगन्नाथाची चित्रं अशी अनेक चित्रं इथे काढली जातात. चित्रांमधले रंग सगळे नसíगक असतात. हिंगूळ जातीचा दगड आणून त्याची पावडर करतात. त्याचा लाल रंग होतो तो या चित्रांमध्ये वापरला जातो. खरंतर या गावात राहायलाच यायला हवे. धावती भेट देऊन काही समाधान होत नाही. खास करून कलाकार मंडळींनी तर तिथे गेलेच पाहिजे. आपल्याकडे दशावतार असतात तसाच इथे गोट्टीपो नावाचा प्रकार आहे. गुरू मागुणीदास यांनी हा प्रकार इथे रूढ केला. केलुचरण महापात्रांचे घर मात्र अगदी दयनीय अवस्थेमध्ये आहे. पद्मविभूषणसारख्या पुरस्काराने गौरवलेल्या या व्यक्तीचे घर इतक्या वाईट स्थितीमध्ये आहे. त्यांचा शिष्यसंप्रदाय पण मोठा आहे. ना त्यांचे लक्ष ना सरकारचे लक्ष. तेवढे एक गालबोट मात्र या गावाला लागले आहे.
ओडिशामध्ये पण एक गाव आहे जिथे घरांना दारे नाहीत. भुवनेश्वरपासून १३० किमी अंतरावर केंद्रपाडा या जिल्ह्यातील राजकणिका या तालुक्याच्या ठिकाणापासून फक्त ५ कि.मी. वर सिआलिया या गावात एक आश्चर्य दडलेले आहे. या गावात जवळ जवळ ८० घरे असून त्या कोणत्याही घराला दरवाजा नाही. अगदी आपल्या शनििशगणापूरसारखे. गावची देवता खोखराई ठकुरानी हिच्यावर गावकऱ्यांची प्रचंड श्रद्धा. ही देवीच घराच्या उंबरठय़ावर बसली आहे, त्यामुळे घराला दार कसे लावणार आणि त्यामुळे कुठल्याही घराला दरवाजा नाही. या गावात चोरी होत नाही. पूर्वी कोणी चोरी केली होती तर तो त्या घरातच अडकून पडला. गावच्या एका बाजूला देवीचे मंदिर आहे. मंदिर म्हणजे मूर्ती उघडय़ावरच आहे. परंतु चारही बाजूंनी भिंत बांधली आहे. इथे देवीला नवस बोलताना लाकडाचा किंवा मातीचा घोडा वाहायची पद्धत आहे. मंदिराच्या परिसरात या घोडय़ांच्या असंख्य मूर्ती पाहायला मिळतात. घराला दरवाजे नसण्याची ही पद्धत देशाच्या एका कोपऱ्यातसुद्धा तेवढीच श्रद्धेने पाळली जाते हे खरेच नवल म्हणायला लागेल. शरदचंद्रपती पंडित हे या देवीचे पुजारी आहेत. काíतकी पौर्णिमेला इथे मोठा उत्सव होतो, पण नवरात्रात मात्र काहीच नसते, हे पण एक अजबच आहे. मंगळवार, गुरुवार आणि शनिवारी गावात कोणत्याही घरी मांसाहार करत नाहीत. तसेच देवीलासुद्धा मांसाचा नवेद्य कधीही दाखवत नाहीत. अत्यंत जागृत देवस्थान म्हणून हे पंचक्रोशीत प्रसिद्ध आहे. इथेपण घराच्या भिंतींवर चित्रकला केलेली दिसते. अगदी वेगळे आणि मस्त ठिकाण बघीतल्याचे समाधान मिळते.
चिल्का सरोवर
ओदिशा म्हटलं की आपसूकच चिल्का सरोवर नजरेसमोर येतं. जैववैविध्याने नटलेल्या या सरोवरात बोटसफर आणि बेटभ्रमंती करता येते. बेटावरच्या पक्षी अभयारण्याला भेट देऊन पक्षी निरिक्षणाने पर्यटनाचा आनंद द्विगुणित होतो.ओदिशाला जायचे म्हणजे चिल्का सरोवर खास आकर्षण असते. ओदिशाच्या किनारपट्टीला लागून हे सरोवर आहे. पलीकडे बंगालचा उपसागर आहे. ओरिसा राज्यातील उथळ, सर्वांत मोठे आणि प्रसिद्ध सरोवर, चिल्का सरोवर हे एक निमखार्या पाण्याचे brackish water - प्रचंड सरोवर आहे. दया नदीच्या मुखाशी समुद्रकिनार्याला लागूनच पुरी, खुर्दा आणि गंजम अशा तीन जिल्ह्यात याचा विस्तार आहे. भारतातील हे पहिल्या क्रमांकाचे आणि जगातील दुसर्या क्रमांकाचे सर्वात मोठे असे समुद्रकिनारी सरोवर आहे. खाऱ्या पाण्याचा हा अथांग जलाशय सरोवर वाटतच नाही. तो एक शांत समुद्रच वाटतो. त्याचा पलीकडचा काठ दिसत नाही. या जलाशयामध्ये खूप मोठय़ा प्रमाणावर डॉल्फिन मासे पाहता येतात.
ल्काच्या पश्चिम किनार्यावरील भुवनेश्वरपासून १२० किमीवरील रंभा, भुवनेश्वरहून ९७ किमी वरील बरकूल ही भुवनेश्वरपासून सोयीची आहेत. भुवनेश्वरहून ११० किमीवरील सतपाडा मात्र चिल्काच्या पूर्व किनार्यावर असून पुरीहून जवळ म्हणजे ६२ किमी आहे. तिथून जलपर्यटनाची सोय आहे तसेच तिथे राहण्यासाठी देखणे यात्री निवास देखील आहे. त्यामुळे पुरीवरूनच सतपाडाला जावे.हे कलकत्ता-मद्रास लोहमार्गावर भुवनेश्वरपासून सु. ८९ किमी. वर आहे.
भरभरून देणार्या चिल्का सरोवरातील संपन्न निसर्ग आणि मासेमारीचा प्रचंड स्रोत सरोवरातील आणि सरोवरतीरावरील कोळ्यांना अन्न, वस्त्र आणि निवारा देतो. उन्हाळ्यात जवळजवळ ९०० चौरस किमी एवढे अवाढव्य असलेले चिल्काचे पाणक्षेत्र पावसाळ्यात जवळजवळ ११६५ चौरस किमी पर्यंत वाढते. सरोवरातून निघालेला ३२ किमी लांबीचा एक लांबलचक पण अरुंद कालवा मोटो या गावी बंगालच्या उपसमुद्राला मिळतो.या सरोवराची जास्तीतजास्त खोली ही ४.२ मीटर एवढी आहे. म्हणजेच हे सरोवर बरेच उथळ असल्याचे आपल्या लक्षात येईल. अलीकडेच सीडीए ने सरोवरातून बंगालच्या उपसागराला मिळणारा आणखी एक कालवा निर्माण केला आहे आणि चिल्काच्या बर्याच मोठ्या विभागाला संजीवनी दिली. हे पुरी आणि गंजाम जिल्हांत पसरले आहे. याची खोली फक्त एक ते दीड मी. असते. बंगालच्या उपसागराच्या एका आखाताच्या तोंडाशी वाळूचा बांध साठून हे निर्माण झाले आहे.हा बांध काही ठिकाणी २०० मी. पेक्षा अधिक रूंद आहे. चिल्काच्या दक्षिणेस व पश्चिमेस सुंदर टेकड्या असून उत्तरेकडील सपाट भागातून भार्गवी व दया या नद्या यास येऊन मिळतात. बांधाच्या खिंडारांतून पुराचे पाणी समुद्रात जाते. चिल्काचे पाणी पावसाळ्यात गोडे व उन्हाळ्यात खारे असते. या सरोवरात पारिकूड आणि मालूड अशी दोन सुंदर बेटे आहेत. त्यांवर भातशेती होऊ शकते. तसेच सोलारी, भालेरी व जतिया या लहान टेकड्याही आहेत.
येथील वनश्री प्रेक्षणीय असून हे मासेमारीसाठी व पाणपक्ष्यांच्या शिकारीसाठी प्रसिद्ध आहे. तसेच सागरी जीवविज्ञान व मत्स्यसंवर्धन यांच्या अभ्यासाची केंद्रे आणि विश्रामगृहेही येथे उघडण्यात आली आहेत. देशातील व परदेशातील अनेक हौशी प्रवासी या रम्य स्थळास भेट देण्यास येतात.१०००० वर्षांपूर्वी हे सरोवर बंगालच्या उपसागराचाच एक भाग होता असे म्हणतात. १९८१ साली झालेल्या जागतिक रामसर कराराप्रमाणे जगातील दलदलीचा प्रदेश म्हणून या सरोवराला मान्यता मिळाली आहे. फार पूर्वीचे काळी कलिंग राज्याच्या कालखंडात हे जागतिक बाजारासाठी एक महत्वाचे बंदर असल्याचे पुरावे पुढे आले आहेत. इथे उत्खनन करतांना अनेक जाहजांची नांगरे सापडली आहेत. या सरोवरात असंख्य बेटे आहेत. १३२ गावातील दीड लाखांचे वर मच्छिमारांचा रोजगार या सरोवरावर अवलंबून आहे.
जैववैविध्याने नटलेल्या या समृद्ध सरोवरात अनेक निर्जन बेटे आहेत. काही बेटांवर लोकवस्ती आढळते. एका बेटावर पक्षी अभयारण्यही आहे. इथे खास परवानगी घेऊन जावे लागते. सरोवरात बऱ्याच ठिकाणी मासेमारी चालते. पण मासेमारीमुळे तिथल्या पर्यावरणावर होणारा परिणाम चिंतेचा विषय आहे.
कालिजाई देवी या सरोवराची देवी. स्थानिक लोक तिच्या विविध आख्यायिका सांगतात. हे सरोवर तसे उथळ आहे. साधारण दोन मीटर इतकेच खोल आहे. त्यामुळे इथे बुडून दुर्घटना होण्याची शक्यता धूसर असते. कालिजाई देवी लोकांचे रक्षण करते, असे लोक मानतात. कालिजाईचे देऊळ सरोवरातील एका बेटावर आहे.
ओदिशातील जगन्नाथ पुरी, कोणार्क, भुवनेश्वर, कटक आणि सातपाडय़ाच्या बाजूचे चिल्का सरोवर पाहण्यासाठी पर्यटकांची गर्दी असते. भुवनेश्वरपासून पुरी साधारण साठ किलोमीटर आहे. पुरीच्या एका दिशेला ५० किलोमीटरवर सातपाडय़ाचे चिल्का सरोवर आहे. पुरीच्या दुसऱ्या बाजूला ३५ किलोमीटरवर कोणार्क आहे. ओडिशामध्ये सार्वजनिक वाहतूक व्यवस्था अतिशय स्वस्त आहे. गर्दीच्या वेळा नसतील, तर ती एक चांगली सोय आहे. टॅक्सी बुक करून जाल, तर पुरीमध्ये मुक्काम, चिल्का अगदी बोटीच्या सफरीसकट आणि उलटय़ा दिशेला कोणार्क असे सगळेच एका दिवसात फिरवून आणून रात्री पुरीमध्ये सोडण्याचा दावा केला जातो. पण हा पर्याय शक्यतो निवडू नये. कारण, त्यात कोणार्क सूर्यमंदिर नीट पाहता येत नाही. पुरी-कोणार्क आणि पुरी- सातपाडा चिल्का रस्त्यावर इतरदेखील अनेक आकर्षणे आहेत.
चिल्का सरोवर नीट बघायचे असेल तर पूर्ण दिवस हवा. आदल्या रात्री मुक्काम करून कालिजाई देवीपर्यंत जायचे असेल, तर सकाळीच सहा-सात वाजता लवकर सरोवरावर जायला हवे. चिल्का पाच- सहा ठिकाणांहून नीट बघता येते. कारण हे सरोवर सत्तर किलोमीटर लांब आणि तीस किलोमीटर रुंद इतके मोठे आहे. बोट बुक करून इथे जाता येते. या पाच-सहा ठिकाणांपकी नेहमीचे म्हणजे गोपालपूरजवळील रंभा, गोपालपूर मार्गावरीलच बालुगाव आणि पुरीकडून जवळ असणारे सातपाडा. बालुगावकडून कालिजाई मंदिर जवळ आहे. तिथे बोट सेवा आहे. मंदिर परिसरात अर्धा तास फिरल्यानंतर तीन तासांत सरोवर बोटीतून पाहता येते. सातपाडय़ाकडून सरोवरातले कालिजाई मंदिर दूर पडते. जाऊन -येऊन दहा-बारा तास हवेत. सातपाडय़ाला बोटींचे बुकिंग होते. टुरिस्ट ऑपरेटर पाच ते सहा पर्यटनस्थळे दाखवणार असल्याचे सांगतात. त्यात लाल खेकडे आणि मोती पाहण्याचे एक ठिकाण, सरोवरातील पक्षी अभयारण्य, डॉल्फिन दर्शन, एक निर्जन बेट असे सगळे असते.

सातपाडय़ाकडून अगदी कालिजाईपर्यंत जाणार नसाल तरी तीन-चार तासांची सफर बोटीतून करता येते. इथली चार-पाच ठिकाणे पाहता येतात. पण बोटीच्या डिझेल इंजिनाचा कर्कश्श आवाज, रणरणते ऊन, आतवर कुठेही खाण्यापिण्याची व्यवस्था नसणे, लाकडी फळीवर कुशन टाकून बसण्याची व्यवस्था आदी समस्या आहेत. तरीही वेळ असेल, आवड असेल, तर ही बोट सफर फार मजेदार आहे. बोटीचे भाडे माणशी ५० रुपये किंवा सगळ्या बोटीचे ८०० रुपये असे आहे. अथांग सरोवरात केलेला हा प्रवास खूप रमणीय असतो. बेटावरील देवीचे मंदिर छोटेसे पण आकर्षक आहे. खाण्या-पिण्याची आणि विविध वस्तूंच्या विक्रीची दुकाने तिथे मांडलेली आहेत. साधारण तीन तास या सगळ्या प्रवासासाठी पुरतात. भुवनेश्वर-विजयवाडा या राष्ट्रीय महामार्गावरून होणारा आपला प्रवास फार सुंदर होतो. अध्र्या दिवसात हा कार्यक्रम उरकता येतो. तिथे ४ तासांची पण बोट राईड आहे, पण ती मात्र कंटाळवाणी असते. बाळूगाव नावाच्या गावी गेल्यावर इथून आपल्याला सरोवरात फेरफटका मारण्यासाठी यांत्रिक बोटी मिळतात.



या धक्क्यावरुन आपल्याला राईडला नेले जाते.

फायबरच्या होड्या तशा जुनाटच दिसतात. निष्काळजीपणे कसातरी रंग फासून नूतनीकरण केलेल्या. इतक्या बेढब, कुरूप होड्या सहसा कुठेच दिसत नाहीत. पर्यटक का म्हणून पुन्हा इथे येतील? हेच रंगकाम थोड्याफार कलात्मकतेने आणि सफाईने करून होड्या तेवढ्याच खर्चात सुंदर बनवता आल्या असत्या. इथे कौशल्य, कसब नाहीतर किमान सौंदर्यदृष्टी, कलासक्ती नक्कीच कमी पडलेले आढळले. मंदिरे बांधतांनाचे सगळे पारंपारिक कुशल, कसबी कामगार कुठे नाहीसे झाले बरे? परकीय आक्रमकांनी सगळे लुटून नेल्यावर आणखी काय होणार? कलावंत कामाच्या भाकरीच्या शोधात विस्थापित झाले असावेत. उरलेल्यात व्यावसायिकतेचा अभाव असावा.

इथल्या होड्यांची चालन व्यवस्था - मोटरायझेशन वैशिष्ट्यपूर्ण आहे. सुकाणूच्या फूट दोनफूट वर एक इंजिन बसवलेले असते. याच्या खालच्या टोकाला लांब दांडी असते. वर खाली करता येण्याजोगी. वर केली की दांडीचे खालचे टोक पाण्याबाहेर. या पाण्यात बुडू शकणार्या टोकाला पंखा. दांडी खाली करून पाण्यात बुडवला की तो होडीला पुढे ढकलतो. वळवला की बोट वळते. आणखी वेगळे सुकाणू काही दिसत नाही. उसाच्या चरकाचे इंजिन जसे हाताने थोडेसे फिरवून - क्रॅंकिंग करून - सुरू करतात तस्सेच हे देखील सुरू करतात.

वाटेत डॉल्फीन दर्शन ठिकाण दिसतात चिल्का सरोवर महाप्रचंडच आहे. वाटेत काही बेटे लागली. एका बेटावर शिडाची होडी उलटी करून तंबू तयार केला होता.
एका मोठ्या बेटावर होडी उभी केली जाते. उतरल्याबरोबर मोतीविके गराडा घालतात. हे लोक शिंपले टोपलीतून काढून फोडून दाखवतात. दर दोनचार शिंपल्यामागे एकाद्यात मोती निघतोच. भरपूर बघून घ्या. घेऊ मात्र काहीच नका. सुरवातिला आव्वाच्या सव्वा दर सांगितला जातो.मात्र घासाघीस केली तर तीनशेचा पांढरा मोती सत्तर ऐशीवर येतो. नंतर दर पाचसात मोत्यामागे एखादा काळा मोती दाखवतात. काळे मोती दुर्मिळ असतात. नशिबानेच मिळतात वगैरे आख्यान बंगाली वळणाच्या उडियामिश्रित गोल हिंदीत सुरू होते. हे मोती आठवण म्हणून घेतले तरी नंतर अर्थातच ते प्लॅस्टीकचे असल्याचे आढळते.नर मादी असे शिंपले असतात, मादी शिंपल्यात मोती असतात असे सांगतात. काही शिंपल्यात चपटा मोती तर काही शिंपल्यात गुलाबीसर मोती, एकात चक्र, तर एकात काळा मोती काढून दाखवतात. नंतर छोटे खडक सारखे दगड फोडून, त्यातून गुरुचा खडा, माणिक, पाचू, पोवळे, इ. काढून दाखवले जातात. ते इतके चकचकीत व पैलू पाडलेले कसे? हा प्रश्न नक्कीच मनात येतो.

परतीच्या वाटेत एक सुरेख बेट लागते.इथले यात्री निवास आकर्षक सुरेख आहे.

त्यांचा दूरध्वनी क्रमांक प्रकाशचित्रात दिसतो आहेच.
नयनरम्य असे सरोवर, अतिशय निसर्गरम्य अशी सृष्टी, शांत, आल्हाददायक वातावरण, पक्षीनिरीक्षणासाठी भरपूर संधि, यामुळे पर्यटनासाठी सुरेख ठिकाण. मंद वार्यावर मधुर ध्वनि करणारी इथली सतपाडा, नलबन, कालीजल, सोमोलो, हनीमून आयलंड वगैरे जमतील तेवढी वेळूची बेटे जरूर पाहावीत. सतपाडा हे तीन बाजूंनी पाण्याने वेढलेले नयनरम्य पक्षी अभयारण्य आहे.रे. सतपाडाला तर वर म्हटलेल्या इरावदी डॉल्फीन या दुर्मिळ जातीच्या डॉल्फीनचे दर्शन देखील घडते. कंथापंथा, कृष्णप्रसादराह (जुने नाव परीकुडा), नवापारा आणि सनाकुडा ही चिल्कामधील इतर बेटे आहेत. एखादा दिवस राहून नौकाविहार करावा, पक्षीनिरीक्षण करावे, आवडत असल्यास ताज्या मासळीचा आस्वाद घ्यावा आणि ताजेतवाने होऊन परतावे.
स्थलांतरित पक्षांना बघण्यासाठी बेस्ट डेस्टिनेशन चिल्का सरोवर!
स्थलांतर करणार्या पक्ष्यांचे हे सरोवर म्हणजे भारतीय उपखंडातील सर्वात मोठे असे हिवाळी आश्रयस्थान आहे. पक्ष्यांच्या तसेच वनस्पतींच्या अनेक दुर्मिळ तसेच धोक्यात आलेल्या प्रजाती इथे आढळतात. मासे देणारा हा एक प्रचंड असा स्रोत आहे. सरोवराकाठच्या तसेच सरोवरातील बेटांवरच्या १३२ गावात दीड लाखापेक्षा जास्त कोळी आपला उदरनिर्वाह फक्त या सरोवरातील मासेमारीवर करतात.
स्थलांतर करणार्या पक्ष्यांच्या १६० पेक्षा जास्त प्रजाती इथे हंगामात स्थलांतर करतात. कॅस्पियन समुद्र, बैकल सरोवर, अरल समुद्र, तसेच रशिया, किरगिजस्तानमधील गवताळ प्रदेश, मध्य आणि आग्नेय आशिया, लडाख आणि हिमालयासारख्या अतिदूरच्या आणि दुर्गम प्रदेशातील पक्षी इथे आश्रय घेतात. स्थलांतर करणारे पक्षी सर्वात जवळचा असा सरळ रेषेतील मार्ग न निवडता जरा दूरच्या मार्गाने येतात याचा विचार केला तर असे लक्षात येते की ते जवळजवळ १२,००० किमी.चा प्रवास करून चिल्का सरोवरात येतात.

साधारण ११ हजार स्क्वेअर किमी परिसरात पसरलेला चिल्का सरोवर जगातलं सर्वात मोठं समुद्री सरोवर आहे. ओडीशातील पुरी जिल्ह्यात हे सरोवर आहे. या सरोवरात अनेक छोटे छोटे सुंदर व्दीप आहेत. हिवाळ्यात इथे कॅस्पियन सागर, इराण, रशिया आणि सायबेरियामधून आलेले स्थलांतरित पक्षी बघायला मिळतात. त्यासोबत या सरोवरामध्ये अनेक प्रकारच्या वनस्पती आणि जीव-जंतू आढळतात. जर तुम्हालाही पक्षांना बघण्याची आवड असेल तर चिल्का सरोवर हे बेस्ट डेस्टिनेशन ठरु शकतं.
सरोवराची खासियत

चिल्का सरोवरात १६० पेक्षा जास्त प्रकारचे मासे आहेत. बोटिंगसोबतच इथे फिशिंग करण्याची सुविधाही आहे. त्यासोबतच सी इगल, ग्रेलॅन गीज, पर्पल मोरहेन, फ्लेमिंगो जकाना यांच्याही प्रजाती बघायला मिळतात. पक्षांसोबतच इथे जंगली जनावरे जसे की, ब्लॅकबग, गोल्डेन जॅकाल, स्पॉटेड हरिण आणि हायना सुद्धा आहेत.
डॉल्फिन आहे या सरोवराचं आकर्षण

चिल्का सरोवर २७ फेब्रुवारी २०१८ ला आंतरराष्ट्रीय स्तरावर इरावदी डॉल्फिनचं सर्वात मोठं ठिकाण घोषित करण्यात आलं आहे. इथे १५५ इरावदी डॉल्फिन आढळले आहेत. यांची संख्या गेल्यावर्षीच्या तुलनेत खूप जास्त आहे. हिवाळ्यात इथे सर्वात जास्त पक्षी बघायला मिळतात. स्थलांतरित पक्षांसोबतच इतरही पक्षी इथे बघायला मिळतात.
१९८१ मध्ये चिल्का सरोवराची आंतरराष्ट्रीय महत्त्वाचे पहिले भारतीय जलस्थान म्हणून रमसर परिषदेत निवड झाली. एका पाहणीनुसार ४५ टक्के पक्षी हे जमिनीवर राहाणारे, ३२ टक्के पक्षी पाण्यात राहाणारे आणि २३ टक्के पक्षी हे बगळ्यासारखे लांब पायांचे, पाणथळ जागी राहाणारे असतात. चिल्का सरोवर १४ जातींच्या शिकारी पक्ष्यांचे निवासस्थान आहे. १३५ दुर्मिळ आणि धोक्यात आलेल्या इरावद्दी प्रजातीचे डॉल्फीन इथे आढळले आहेत. त्याशिवाय इथे सरपटणार्या प्राण्यांच्या आणि उभयचरांच्या ३७ प्रजाती आढळतात. सूक्ष्मशैवाल, समुद्री लव्हाळी, समुद्री गवत, मासे, खेकडे चिल्काच्या निमखार्या पाण्यात फोफावतात. त्यामुळे चिल्काला पर्यावरणाच्या दृष्टीने असामान्य महत्त्व प्राप्त झाले आहे. चिल्का हे पक्षी अभयारण्य म्हणूनही घोषित केले गेले आहे.
या सरोवराच्या विकासासाठी १९९२ साली चिलका डेव्हेलपमेंट अथॉरिटी नावाची संस्था स्थापन करण्यात येवून तिच्याकडे या सरोवराच्या विकासाची जबाबदारी या संस्थेवर सोपविली गेली आहे. इंडीयन सोसायटी रजिस्ट्रेशन ACT या कायद्याखाली या संस्थेची नोंदणी करण्यात आली आहे. संस्थेचे उद्देश पुढीलप्रमाणेः (१) सरोवराच्या पारिस्थितीकीचे संरक्षण करणे (२) समाजाच्या हिताच्या दृष्टीने उपलब्ध साधनसामग्रीचा एकात्मिक विकास साधणे (३) जगातील व देशातील इतर संस्थांच्या मदतीने बहुआयामी विकासाच्या दृष्टीने प्रयत्न करणे (४) जगातील व देशातील या संबंधात कार्य करणार्या संस्थांशी संपर्क साधून भविष्यातील विकासाची दिशा ठरविणे.
या संस्थेने एक अतिशय उपयुक्त अशी भागीदारी प्रस्थिापित केली आहे. या भागीदारीत राज्य सरकारची १७ कार्यालये, ३३ स्वयंसेवी संस्था, ४ देशाची मंत्रालये, ६ राष्ट्रीय व अंतरराष्ट्रीय संस्था, १२ संशोधन संस्था व ५ कमियुनिटी ग्रूप्स यांचा समावेश करण्यात आला आहे. १९९२ साली सुरवातीला या सर्वांना घेवून एक कृती आराखडा तयार करण्यात आला पण योग्य तांत्रिक ज्ञानाअभावी तो मूर्त स्वरुपात ये़वू शकला नाही. म्हणून १९९७ साली आधीच्या आराखड्याची पुनर्रचना करुन त्यातील दोष दूर केले व नवीन कार्यक्रम आखण्यात आला आहे. या संस्थेला केलेल्या कामाबद्दल अनेक पुरस्कारही प्राप्त झाले आहेत.

भारतात आणि जगात अनेक ठिकाणी सरोवरे आहेत. यातीलच ओडिशा राज्यात चिल्का हे अतिशय मोठे सरोवर आहे. चिल्का हे भारतातील सर्वात मोठे तर जगातील दुसरे मोठे समुद्री सरोवर आहे.

या सरोवराचे खास आकर्षण म्हणजे या सरोवराचे पाणी पावसाळ्यात गोडे आणि उन्हाळ्यात खारे असते. जगभरातील पर्यटक हा सरोवर पाहण्यासाठी येत असतात.

चिल्का सरोवर कोलकाता आणि मद्रास लोहमार्गावर भुवनेश्वरपासून 89 किलोमीटर एवढ्या अंतरावर आहे. येथील वनसंपदा प्रेक्षणीय असून मासेमारीसाठी आणि पाणपक्ष्यांच्या शिकारीसाठी हे सरोवर प्रसिद्ध आहे.

या सरोवरात पारिकूड आणि मालूड अशी दोन सुंदर बेटे आहेत. या दोन बेटांशिवाय येथे अनेक निर्जन बेटे देखील आहेत.

या सुंदर बेटांवर भातशेती होते. यातील काही बेटांवर लोकवस्ती देखील आहे. तसेच सोलारी, भालेरी आणि जतिया या लहान टेकड्या देखील आहेत. या ठिकाणी येण्यासाठी परवानगी घ्यावी लागते. चिल्का सरोवरात खूप ठिकाणी मासेमारी चालते.

चिल्का हे भारतातील सर्वात मोठे खाऱ्या पाण्याचे सरोवर आहे. भारतीय उपखंडात स्थलांतरित होणाऱ्या पक्ष्यांसाठी देखील चिल्हा सरोवर प्रसिद्ध आहे.

चिल्का या सरोवरात विविध प्रकारच्या वनस्पती असून अनेक प्रजातींची जनावरे देखील येथे आहेत. जैववैविध्याने नटलेल्या या सरोवरात बोटसफर आणि बेटभ्रमंतीला पर्यटक खास पसंती देतात. चिल्का सरोवरात दोन प्रकारचे डॉल्फीन आहेत. चिल्का सरोवरातील पर्यटनाचा सर्वात महत्त्वाचा टप्पा म्हणजे सरोवरातील बेटं आहेत.

हे सरोवर सत्तर किलोमीटर लांब आणि तीस किलोमीटर रुंद आहे. तर 16 ते 32 किमी रूंद आहे. याची खोली फक्त एक ते दीड मीटर असते. यामुळे येथे बुडून होणाऱ्या दुर्घटना घडत नाहीत.

बंगालच्या उपसागराच्या एका आखाताच्या तोंडाशी वाळूचा बांध साठून हे निर्माण झाले आहे.

चिल्का हे ओडिशामधील पुरी आणि गंजाम या दोन जिल्हांमध्ये पसरले असून याचा विस्तार पावसाळ्यात 1,165 चौ. किमी आणि उन्हाळ्यात 891 चौ. किमी. असतो.
कालीजाई द्वीप
हे आयलंड देवी कालीच्या मंदिरासाठी आणि आजूबाजूच्या सुंदरतेसाठी प्रसिद्ध आहे. जानेवारीमध्ये मकर संक्रांतीच्या दिवशी इथे भाविकांची मोठी गर्दी असते.
सतपाड़ा
हे ठिकाणा डॉल्फिन पॉईंटच्या जवळ आहे. इथे इरावदी आणि बॉटल नोस डॉल्फिन सहजपणे बघता येतील.
कधी जावे?
तसं तर इथलं वातावरण वर्षभर चांगलं असतं त्यामुळे इथे तुम्ही कधीही जाऊ शकता. पण जास्तीत जास्त पक्षी बघण्यासाठी ऑक्टोबर ते मार्च दरम्यानचा काळ चांगला असतो.
कसे पोहोचाल?
विमान मार्गे - भुवनेश्वर येथील जवळील एअरपोर्ट आहे. सरोवरापासून हे जवळपास १२० किमी अंतरावर आहे. सरोवरापर्यंत पोहोचण्यासाठी येथून टॅक्सी किंवा बसेस मिळतात.
रेल्वे मार्ग - बालूगांव हे येथील जवळचं रेल्वे स्टेशन आहे. बालूंगावमधून सरोवराला पोहोचण्यासाठी बसेस उपलब्ध आहेत.
रस्ते मार्ग - NH5 पासून चिल्का सरोवराचा एक भाग सहजपणे पाहिला जाऊ शकतो. त्यासोबतच भुवनेश्वर आणि कटकपासून ते बालूगांवपर्यंत सतत बसेस सुरु असतात.
कोणार्क :-
कोणार्क हे ओदिशातील पुरी जिल्ह्यातले एक लहानसे शहर. कोन्यातील म्हणजे कोपर्यातील सूर्य (अर्क = सूर्य) असा कोणार्क याचा अर्थ आहे. १३व्या शतकात इथले सूर्यमंदीर बांधलेले आहे. यालाच ब्लॅक पॅगोडा असेही म्हणतात. पूर्व किनार्यावरील अनंतवर्मन चोडगंगदेव याने आपल्या गंग वंशाची सत्ता भारताच्या या पूर्व किनार्यावर स्थापन केली. या गंग वंशाच्या नरसिंहदेव (इ.स. १२३६ ते १२६४) या राजाने हे वालुकाश्मातले मंदीर बांधले. जालावर काही ठिकाणी याला लंगूल नरसिंह देव असे देखील म्हटलेले आहे. असो. जगातील सर्वांत आश्चर्यकारक अशा धार्मिक पुराणवास्तूंपैकी एक असलेले हे मंदीर हा ओदिशामधील मंदीरस्थापत्यातील शिरपेच आहे.
ऋग्वेदकालापासून सूर्य ही भारतीयांची लोकप्रिय देवता आहे. कोणार्क इथे धर्म आणि विज्ञान यांची अप्रतिम सांगड शिल्पकलेशी घातलेली आहे आणि त्यामुळे ही एक अजोड अशी शिल्पवास्तू ठरली आहे. किंवा असं देखील म्हणता येईल की विज्ञान लोकप्रिय करण्यासाठी हिंदु धर्मातील अप्रतिम अशी लोकप्रिय प्रतीके इथे शिल्पाकृतीतून वापरलेली आहेत. सूर्याची ही प्रतिमा आर्यांबरोबर भारतात आली. प्राचीन बाबिलोनियन आणि इराणी संस्कृतीतून ही सूर्यप्रतिमा भारतीय संस्कृतीत रुजली असे बहुतेक इतिहासकारांचे मत आहे. परंतु रथाच्या आकाराचे मंदीर बांधण्याची विलक्षण कल्पना मात्र पूर्णपणे अभिनव आणि अलौकिक सृजनाचा स्पर्श असलेली अशी आहे. आणि म्हणूनच हा जागतिक सांस्कृतिक ठेवा आहे असे युनेस्कोने जाहीर केलेले आहे. त्याचबरोबर मंदीरस्थापत्य हा देखील एक मनोरंजक आणि आनंददायी विषय आहे.
नारदाच्या खोडकर, कळी लावण्याच्या स्वभावामुळे एकदा श्रीकृष्णपुत्र सांब याला आपल्या पित्याचे कोपभाजन व्हावे लागले. सांबाने आपल्या स्वभावानुसार एकदा नारदाची खोडी काढली. त्याला धडा शिकवण्यासाठी म्हणून नारदमुनी त्याला एका ठिकाणी घेवून गेले. नेमके ती जागा श्रीकृष्णाच्या बायकांची स्नान करण्याची जागा होती. सांबाला तिथे सोडून नारद त्याच्या नकळत कृष्णाला तिथे घेवून आले. आपल्या बायकांच्या स्नानाच्या ठिकाणी सांबाला पाहून संतप्त झालेल्या कृष्णाने त्यास कुष्ठरोग होइल असा शाप दिला. नंतर सांबाने आपले निर्दोषत्व सिद्ध केले पण एकदा दिलेला शाप परत घेणे शक्य नव्हते. त्यामुळे श्रीकृष्णांनी त्यास सुर्यदेवांची आराधना करण्यास सुचवले. त्यानुसार बारा वर्षे सुर्याची आराधना केल्यावर सांबास आपले आरोग्य आणि सौंदर्य पुनश्च प्राप्त झाले.
"पुत्रा, गुन्हाच तसा घडला होता तुझ्याकडून. भलेही नारदमुनींनी मुद्दाम कळ लावून हे घडवून आणलय. पण चुकून का होइना तू श्रीकृष्णमहाराजांचा गुन्हा केलास आणि त्यांच्या तोंडून शापवाणी निघाली. आणि तूला कुष्ठरोग झाला."
"अगदी योग्य बोललीस माते, पण माझं निर्दोष असणं सिद्ध झाल्यावर तातांनीच त्यावर उ:शाप म्हणून सुर्यपुजेचा उपाय सांगितला. सुर्यदेव जे सर्व त्वचाविकारांचे नाशक मानले जातात त्यांची साधना."
"आणि गेल्या बारा वर्षाच्या अथक साधनेनंतर आज तू त्या महाभयंकर व्याधीतून मुक्त झालास. आता पुढे काय करायचे ठरवले आहेत. सुर्यपुजा अशीच चालू ठेवणार?"
"माते, गेली बारा वर्षे चंद्रभागेच्या तीरी मित्रवनातील या पवित्र जागी सुर्यदेवांची उपासना करत आलोय. त्यांच्या कृपेने या व्याधीतून मुक्त झालोय. त्या सुर्यदेवांचं भव्य मंदीर या ठिकाणी उभे करायची माझी इच्छा आहे."
"अगदी माझ्या मनातले बोललास पुत्रा, पण आधी या आनंदाच्या क्षणी श्रीकृष्ण महाराजांचे दर्शन घेवून त्यांचे आशीर्वाद घेवूया. या मंदीर उभारणीबद्दलही त्यांचे मार्गदर्शन घेणे आवश्यकच आहे, नाही?"
"चल माते, आधी तातांचे आशीर्वाद घेवून त्यांच्यासमोर ही मनीषा व्यक्त करू."
आणि श्रीकृष्णपुत्र सांब आपली माता जांबुवंतीसह पित्याच्या महालाकडे, त्या सर्व शक्तिमान, पुर्ण पुरूषाच्या, देवोत्तमाच्या, श्रीकृष्णाच्या दर्शनासाठी निघाला.......!
सांबाने कोणार्कला येऊन सुर्याची आराधना केली आणि त्याचा त्वचारोग बरा झाला. म्हणून त्याने येथे सूर्याचे मंदिर बांधले. पुढे नरसिंगदेव या कलिंगाच्या राजाने इ. स. तेराव्या शतकात सध्याचं सूर्यमंदिर बांधलं.
सांबपुराणानुसार श्रीकृष्णपुत्र सांबाने आपल्या कृतज्ञतेचे प्रतिक म्हणून त्याकाळी चंद्रभागेच्या तीरी (सद्ध्याची चिनाब त्याकाळी चंद्रभागा या नामे ओळखली जात असे म्हणे) पुढे सांबाच्या नंतर मुळ-सांबपुर म्हणुन ओळखल्या गेलेल्या नगरी (सद्ध्याचे पाकिस्तानमधील मुलतान) एक विशाल सुर्यमंदीर बांधले. साधारण सातव्या शतकात भारताला भेट दिलेल्या चिनी प्रवासी ह्यु-एन त्संग याच्या लिखाणात मुलतानच्या या पुरातन सुर्यमंदीराचे उल्लेख येतात. नंतर हे मंदीर जिथे सांबाने प्रत्यक्ष सुर्याची आराधना केली होती तिथे हलवण्यात आले. यामागे देखील एक दंतकथा आपल्या पुराणात तसेच कपिल संहितेत आढळते. उडीया भाषेतील मदला पंजी या स्थानिक ग्रंथातदेखील अशाच प्रकारची दंतकथा सापडते.
आपली तपश्चर्या पुर्ण केल्यावर सांबाने चंद्रभागेत ( हे चंद्रभागा म्हणजे एक छोटेसे सरोवर आहे कोणार्कपासुन काही किमी अंतरावर) स्नान करण्यासाठी म्हणून एक डुबकी मारली, तेव्हा त्याला पाण्यात एक मुर्ती सापडली. जी विश्वकर्म्याने घडवलेली सुर्याची मुर्ती होती. त्या मुर्तीची सांबाने तिथुन जवळच असलेल्या मित्रवनात एक छोटेसे मंदीर बांधून तिथे प्रतिष्ठापना केली. बहुदा आताचे कोणार्क आणि त्यावेळचे मित्रवन या जागा एकच असाव्यात, म्हणूनच सांबाने सांबपूरात बांधलेले भव्य सुर्यमंदीर पुन्हा इथे स्थलांतरीत करण्यात आले.
(दंतकथा संदर्भ : श्री सांब पुराण)
दुसर्या एका दंतकथेनुसार पुढे कधीतरी केसरी राजवंशाच्या पुरंदरकेसरी नामक राजाने कोनार्क देवाचे एक मंदीर उभे केले. कोनार्क हा शब्द बहुदा कोना भारताच्या एका कोपर्यातच ओरिसातील हे जगदविख्यात सुर्यमंदीर वसलेले आहे) आणि अर्क (सुर्य) यांच्या संधीतून निर्माण झाला असावा. त्याला त्याकाळी कोनादित्य या नावाने संबोधले जात असे. त्यानंतर तिथे गंगा राजवंशाच्या राजवटीत राजा नरसिंहदेव (१२३८-६४) याने या मंदीरासमोरच दुसरे एक भव्य मंदीर उभे केले. राजा नरसिंहदेवाचा पिता राजा अनंगभिम याने पुरीच्या जगन्नाथासमोर या मंदीराचे एका भव्य मंदीरात रुपांतर करण्याचे कबुल केले होते. हे मंदीर एका रथाच्या आकाराचे होते. मध्यभागी अतिषय देखणे असे भव्य मंदीर (रथ) ज्याला सात अश्व आणि चक्रांच्या (चाकांच्या) १२ जोड्या म्हणजे रथाला अतिशय सुक्ष्म आणि सुंदर कोरीवकाम केलेली एकुण २४ चाके आहेत.
काळाच्या ओघात कोणार्क, तिथली मंदिरे आणि पवित्र स्थाने यांभोवती असलेले कीर्ती आणि समृद्धीचे वलय लोपले. या वास्तूची समृद्धी आणि हे वलय किती काळ होते आणि नक्की केव्हा ते लयाला गेले याबद्दल नक्की काहीही सांगता येत नाही. मंदिराची अशी दुर्दशा कशी काय झाली याला १०० टक्के विश्वासार्ह असा कोणताही ऐतिहासिक पुरावा नाही. याबाबत इतिहास मूक आहे. काळाच्या गडद धुक्यात हे गूढ दडलेले आहे. परतु या अप्रतिम मंदिराच्या पतनाबद्दल इतिहासकारांनी विविध तर्काधिष्ठित मते मांडलेली आहेत. सर्वात लोकप्रिय आणि विश्वासार्ह वाटेल अशी दंतकथा आहे धर्मपादाची.

गंग वंशाचा राजा नरसिंह देव - १ याने आपल्या राजवंशाच्या राजकीय सर्वश्रेष्ठतेचे प्रतीक म्हणून हे मंदीर बांधायला आदेश दिला. बाराशे स्थापत्यशास्त्रज्ञ आणि कुशल कारागीर यांनी आपल्या आयुष्यभराची प्रतिभा, आपले अविश्रांत श्रम आणि पूर्ण कसब तब्बल बारा वर्षे पणाला लावले. तेवढाच काल राजाने जमा झालेली करसंपत्ती खर्च केली. तरीही पूर्णत्वाचे चिन्हही कुठे दिसेना. मग ठरलेल्या दिवशी काम पूर्ण झालेच पाहिजे, अन्यथा सर्व शिल्पकारांना देहदंड होईल असा अंतिम आदेश त्याने काढला. सिबेई सामंतराय या प्रमुख सूत्रधाराने म्हणजे स्थापत्यकाराने असमर्थता दर्शवली. तेव्हां बिशू महाराणा या स्थापत्यशास्त्रज्ञाने ते पूर्ण केले. परंतु मर्मशिला आणि कळस बसवायचे काम मात्र अजून जमले नव्हते. सगळ्या स्थापत्यचमूने आता हात टेकले होते. ही मर्मशिला योग्य रीतीने बसवली की वास्तूच्या वरील भागाचा भार पेलणार्या खांब, तुळया वगैरे घटकांवर पडणारा भार योग्य दिशेने, भारपेलक घटकांना पेलता येईल अशा योग्य प्रमाणात विभागला जातो आणि मगच वास्तू दीर्घकाल टिकू शकते. नाहीतर ती कोसळण्याचा धोका वाढतो.
बिशू महाराणाचा बारा वर्षांचा मुलगा धर्मपाद हा तिथे सहज मंदीर बांधायचे काम कसे काय चालते ते बघायला आला. स्थापत्यशास्त्रज्ञांना भेडसावणारी चिंता त्याला जाणवली. मंदीर बांधण्याचा तसा त्याला अनुभव नव्हता. तरीही मंदीर बांधण्याच्या स्थापत्यशास्त्राचे सखोल ज्ञान मात्र त्याला होते. मंदिराच्या शिरोभागी स्थापन करायची मर्मशिला बसवायचे कठीण असे गणिती सूत्र सोडवायचे आव्हान त्याने स्वीकारले आणि ते काम स्वतःच करून त्याने सर्वांना चकित केले. कळसाचा शेवटचा दगड त्याने स्वतःच्या हाताने बसवला, आणि कळस पुर्ण झाला. पण हा शेवटचा दगड काही वेगळ्याच प्रकारचा होता. तो नक्की दगडच होता की......?परंतु ही कामगिरी केल्यानंतर थोड्या दिवसातच त्या बालबृहस्पतीचे कलेवर समुद्रकिनारी मंदिरापाशीच आढळून आले. (तेव्हा समुद्रकिनारा मंदिराला लागूनच होता. आता तो २ किमी दूरवर गेला आहे.) आत्महत्त्या किंवा खून! बारा वर्षाच्या धर्मपादाने आपल्या वास्तु रचनाकार समाजासाठी स्वतःचे प्राण वेचले असेच ही दंतकथा सांगते. धर्मपदाने आपल्या योगशक्तीच्या जोरावर आपल्या शरीरातील सर्व उर्जा त्या दगडात ओतून त्याचे एका महा - शक्तिशाली चुंबकात रुपांतर केले होते. त्यामुळे काही दिवसातच त्याचा मृत्यू झाला. पण त्याची पुर्ण ज्ञाती त्याच्या या त्यागामुळे राजाच्या कोपाला बळी जाण्यापासून वाचली..एकापेक्षा एक असे श्रेष्ठ स्थापत्यशास्त्रज्ञ असतांना एक बारा वशांचा मुलगा हे काम करून दाखवतो हे त्या ढुढ्ढाचार्यांना सहन झाले नसावे. त्यामुळे त्यांनी कामात त्रुटी ठेवली असावी आणि नंतर धर्मपादाचाही काटा काढला. याच त्रुटीमुळे नंतर मंदीर पडले. हे सत्य जर मानले तरी याला स्वीकारार्ह असा ऐतिहासिक पुरावा मात्र नाही. सत्य आणि कल्पिताची एकजिनसी सरमिसळ, दुसरे काय?
दुसर्या एका मतानुसार धर्मांध मुस्लिम सेनापती काळापहाड याने इतर अनेक मंदिरांबरोबरच हे कोणार्कचे मंदीर देखील पाडले. भुवनेश्वरमध्ये त्याने पाडलेल्या अनेक मंदिरांचे भग्नावशेष अजूनही आहेत. वैतल मंदिराच्या प्रकाशचित्रात असे एक शिखराचा काही भाग उडवलेले मंदीर आहे. हिंदु इतिहासात व्यक्ती किंवा मंदीर बाटवले जाणे हा एक प्रकार आहे. मंदीर बाटल्यामुळे अपवित्र झाले म्हणून देखील सोडून दिले असू शकते. आणि सोडून दिल्यामुळे नंतर ओसाड होऊन पडझड झाली असावी. ऐतिहासिक पुरावा नसला तरी यात मात्र विश्वास न ठेवण्यासारखे काही दिसत नाही.
मूळ मंदिराची रचना, पिवळ्या रंगात चिन्हांकित केलेले क्षेत्र आजही शिल्लक आहे [२००४, गेराल्ड अनफोसी / सीसी बाय-एसए ( http://creativecommons.org/licenses/by-sa/3.0/ ) ]
हे एकमेव दस्तऐवज आहे ज्यात संपूर्ण मंदिर कसे दिसते याचे संपूर्ण चित्र बघायला मिळते. हे चित्र 17 व्या शतकाच्या सुरुवातीला मंदिराचे कसे होते याचे संपूर्ण रेखाटन दाखवते. मधोमध असलेला खांब अरुणास्तंभ आहे, जो नंतर अवशेषांमधून परत मिळवला गेला आणि पुरीच्या जगनाथ मंदिरात स्थलांतरित झाला.
यातील उंच शिखराचा (बुरुज) चक्काचूर झाला आहे आणि हा कधी आणि कसा झाला याबद्दल परस्परविरोधी मतप्रवाह आहेत. मंदिराचे शिखर थोड्या प्रमाणात उभे होते, 1847 मध्ये जेम्स फर्ग्युसन यांचे रेखाटले आहे.मात्र तोपर्यंत मंदिराचा हा भाग डागडुजी करण्याजोगा राहिला नाही.

जेम्स फर्ग्युसन लिखित "कोणार्कचे मंदिर",या १८४७ साली छापलेल्या पुस्तकात जगमोहनाच्या मागे दिसणारे शिखराचे अवशेष दिसून येतात
मुख्यमंदीरालाच लागून असलेल्या या भव्य मंदीरालाच (सभामंडप) जगमोहन म्हणूनच संबोधले जात असावे. कारण तिथले गाईडलोक त्याचा उल्लेख जगमोहन असाच करीत होते. साधारण ३० चौरस मिटर आकारमान आणि तेवढीच उंची लाभलेल्या जगमोहन नामक या वास्तुला लागुनच मुख्य सुर्यमंदीर कळासासहीत उभे आहे (साधारण ६८ मिटर उंच). पुढच्या काळात कधीतरी शिखराचा भाग ढासळला गेला... (त्याची कारणे आजही अज्ञात आहेत)
यासंदर्भात इथे गाईडकडून एक विलक्षण दंतकथा ऐकायला मिळाते. त्यानुसार त्यावेळी जगमोहनाचे शिखर बांधताना त्यात एक विलक्षण शक्तीशाली असा चुंबक बसवण्यात आला होता. तो चुंबक सर्व वास्तुचा (कळस) भार सावरून धरत असे. परंतू मध्ये काही शतकांपुर्वी मंदीरावर वीज कोसळली आणि त्यावेळी तो चुंबक निखळून पडला आणि त्या नंतर मंदीराचे शिखर ढासळायला सुरूवात झाली. ही कथा जर खरी असेल तर त्यावेळचे आपले वास्तुशास्त्र किती प्रगत असेल याची कल्पनाच केलेली बरी. नंतर शिखर कोसळायला सुरूवात झाल्यावर मंदीरात आत, गाभार्यात भर घालून लोकांना जाण्यास मनाई करण्यात आली. तिन्ही बाजुला असलेली दारे आता सुरक्षेच्या कारणास्तव काँक्रीटने बंद करण्यात आलेली आहेत. त्यापुर्वी वर सांगितल्याप्रमाणे आतली जगमोहनाची मुर्ती काढून बाहेरील नटमंदीरात स्थापीत करण्यात आली. जगमोहनाचे छत तीन विभीन्न स्तरात विभाजीत करण्यात आले आहे. या तिन्ही स्तरांवर अतिशय सुंदर आणि सुक्ष्म नक्षीकाम केलेली विविध शिल्पे कोरण्यात आलेली आहेत.
जगमोहनाला लागूनच मुख्य सुर्यमंदीर आहे. इथे बाहेरच्या बाजुने, चौकटीमधून तीन सुर्यप्रतिमा स्थापीत करण्यात आलेल्या आहेत. जे काही समोर होते ते विलक्षण भारावून टाकणारे आहे. या तिन्ही सुर्यप्रतिमा शैशव, तारुण्य आणि वार्धक्य या मानवी जीवनाच्या तीन कालावधीनुसार बसवलेल्या आहेत. काळ्या पत्थरात (क्लोराईट) कोरलेल्या या सुर्यप्रतिमा अतिषय देखण्या आणि भव्य आहेत. आपल्याकडे वैदिक काळापासून सुर्यपुजेची पद्धत आहे. पण सुर्य हा आपला देव नाही. सुर्य हा आर्यांचा देव. शेकडो युगांपूर्वी आर्य जेव्हा भारतात आले तेव्हा त्यांनी आपल्या बरोबर आपले देवही आणले. त्यात सुर्य हा प्रमुख देव होता. त्यामुळेच आपल्या इतर देवांपेक्षा वेगळी एक गोष्ट सुर्याच्या प्रतिमेत आढळते ती म्हणजे सुर्यदेवाच्या पायात घोट्याच्याही वर येणारे बुट आहेत.कारण सूर्य हा इराणी (झरतुष्ट्राच्या अगोदरचे) देव आहे त्यामुळे "खरी सूर्यप्रतिमा" ओळखायची खूण ही असते.


मंदिराच्या प्रवेशद्वाराशी दोन सिंह पहारा देतात. दोन्ही सिंह युद्धातील एकेका हत्तीचा संहार करतांना दाखवले आहेत. सिंह हे हिंदु धर्माचे तर हत्ती हे बौद्ध धर्माचे प्रतीक आहे. म्हणजे हिंदु धर्माने बौद्ध धर्मावर विजय मिळवला. हे दोन्ही हत्ती योद्ध्यांच्या एकेका शरीरावर उभे आहेत. सिंह हे शौर्याचे तर हत्ती हे संपत्तीचे देखील प्रतीक आहे. गजांत लक्ष्मी हा शब्दप्रयोग आपण ऐकलेला, वाचलेला आहे. म्हणजे संपत्तीने अगोदर मानवता धुळीला मिळवली नंतर शौर्याने संपत्तीवर विजय मिळवला असा देखील यातून अर्थ काढता येतो.
राजा नरसिंह देव याला खगोलशास्त्रावर अतीव स्वारस्य होते. सात घोडे हे आठवड्याच्या सात दिवसांचे प्रतीक आणि बारा चाके हे बारा महिन्यांचे प्रतीक समजले जाते. चाके अप्रतिम कोरीव कामाने नटलेली आहेत. प्रत्येक चाकाला आठ अर्या आहेत. दिवसाला आठ प्रहर असतात म्हणजे आठ अर्या हे आठ प्रहरांचे प्रतीक आहे.
मंदिरासमोर दोन्ही बाजूला सिंह, त्याखाली हत्ती आणि त्याहीखाली माणूस, अशी शिल्पं आहेत. सिंह हे संपत्तीचं आणि हत्ती हे सत्तेचं प्रतीक आहे. सत्ता आणि संपत्ती माणसाला चिरडते असं दाखवणारी ही शिल्पं आहेत.
गाभार्यावरचे आणि नटमंदिरावरचे छत पडलेले आहे.
"गाभार्याला तीन बाजूंनी पुढे आलेल्या सूर्यदेवाच्या तीन सुंदर मूर्तींमुळे शोभा आली आहे. पूर्वाभिमुख मंदिरात सूर्योदयाच्या वेळी सूर्यकिरणे थेट या मूर्तीपर्यंत पोहोचतात. दररोज या तीन सूर्यमूर्तींपैकी किमान एका तरी सूर्यमूर्तीवर सकाळची कोवळी सूर्यकिरणे पडावीत अशी योजना स्थापत्यकारांनी केलेली आहे." असे वर्णन महाजालावर मिळते. परंतु या सूर्यमूर्ती आता गायब आहेत असे वाचले होते.गाभारा आणि जगमोहन एकाच चौथर्यावर आहेत. मुख्य मंदिरावर सर्व बाजूंनी नक्षीदार वेलबुट्ट्या आणि भौमितिक आकृत्या कोरलेल्या आहेत तसेच नर्तकांच्या, यक्षांच्या तसेच देवदेवतांचा भावविभोर नृत्याकृती आहेत.

कोणार्कबद्दल आश्चर्यकारक गोष्ट म्हणजे इथे असलेल्या कामुक कोरीव शिल्पांची संख्या, काहींच्या अंदाजानुसार कोणार्कच्या सर्व नक्षीकामांपैकी 40% कामुशिल्प किंवा काम दृश्ये आहेत. अशा गोष्टींसाठी सर्वात प्रसिद्ध मंदिर म्हणजे अर्थातच खजुराहो हे आहे , मात्र कोणार्क येथे अशा कलेचे प्रमाण अधिक प्रचलित असून येथील कोरीव काम थोडे चांगले जतन केले गेले आहे. काही नृत्याकृतीत कामसूत्रातून घेतलेली कामुक हावभाव करणारी जोडपी आहेत. कालौघात वातावरणामुळे शिल्पे झिजली आहेत परंतु मूळ शिल्पातल्या कोरीवकामाचे सौंदर्य लपत नाही.
येथील आकृतिबंध प्रचंड वैविध्यपूर्ण आहेत; कामुक जोडपे, विविध पोझ, नाग, व्याला, सैनिक, हत्ती, दरबारातील देखावे, पण दैनंदिन जीवनातील प्रथा आणि विधी यांचे चित्रण करणार्या शिल्पांमध्ये एका तरुणीचे शिल्प थक्क करणारे आहे. एक स्त्री अग्नीवर पाय ठेवत असल्याचे दिसते, याचा अर्थ तज्ज्ञांच्या मते बाळंतपणानंतर योनीतून बरे होण्याची प्रक्रिया दर्शवते. ओडिशातील बोंडा जमात आजही ही प्रथा आहे.
इतिहासात मानवाने मह्त्वाच्या विविध घटनांची नोंद करणे, भविष्यातील लोकांसाठी संदेश देणे, आपल्या भावना, आपले तत्वज्ञान याची नोंद करणे यासाठी वाङ्मयातून, दस्तावेजामधून आणि चित्रे, शिल्पे आदि कलाकृतीमधून जागोजाग प्रतीकांचा वापर केलेला आहे. रामायण, महाभारत, ओडिसी इलियड इ. प्राचीन महाकाव्यापासून आधुनिक काळातील साहित्यिकांपर्यंत कित्येकांनी नी आपापल्या साहित्यात विविध प्रतीकांचा अप्रतिम असा सौंदर्यपूर्ण वापर केलेला आहे तर काही अभिनव प्रतीके स्वतःच निर्मिलेली आहेत. विविध वास्तूत, शिल्पात देखील अशाच विविध प्रतीकांचा वापर केलेला आहे.


रथाचे घोडे मात्र आता भंगून गेलेले आहेत. चाकंही काही सगळी सुस्थितीत नाहीतच. ही चाकं पूर्वपश्चिम दिशेने आहेत आणि रोचक बाब म्हणजे ही चाकं वापरून आपल्याला दिवसाची वेळ सांगता येते. एखादी सरळ काठी चाकाच्या मध्यबिंदूकडे रोखून धरली, की तिची सावली कुठे पडते यावरून अचूकपणे वेळ कळते. कोणार्कमधे सर्वात जास्त बघन्यालायक काय असेल तर ते रथाची चोवीस चक्रे. प्रत्येक चक्रावर वेगळ्या मूर्ती. वेगळी थीम. आणि त्या चक्रावर पडणार्या सावलीवरून अचूक वेळदेखील सांगता येते.
रथाच्या चाकात आर्या (स्पोकस ) मधे जे गोल आहेत . त्यात नायिकेची पूर्ण दिनचर्या दाखविणार्या मुद्रा आहेत.चित्र मोठे करून पाहिल्यास थोडी कल्पना येते.
उत्तरायणात उत्तर बाजूच्या चाकांवर सूर्यप्रकाश पडतो, दक्षिणायनात दक्षिण बाजूच्या चाकांवर. प्रत्येक चाकावर सुरेख नक्षीकाम आहे. मंदिराला पूर्वेच्या बाजूला तीन दरवाजे आहेत. सूर्य जेव्हा मकरवृत्तावर जातो (उत्तर गोलार्धात सर्वात लहान दिवस), तेव्हा सकाळी सूर्य उगवल्यावर त्याचे किरण मुख्य दरवाज्याच्या दक्षिणेकडे असलेल्या दरवाजातून आत शिरतात. याउलट जेव्हा सूर्य कर्कवृत्तापर्यंत जातो, (उत्तर गोलार्धात सर्वात मोठा दिवस) तेव्हा मुख्य दरवाज्याच्या उत्तरेकडे असलेल्या दरवाजातून सूर्यकिरण आत शिरतात. जेव्हा दिवस-रात्र समसमान असते, म्हणजेच ज्या दिवशी सूर्य बरोबर विषुववृत्तावर असतो, तेव्हा सकाळी पहिले सूर्यकिरण मधल्या मुख्य दरवाजातून आत शिरतात. इ. स. तेराव्या शतकात हे मंदिर बांधलेलं आहे. पुरीचं जगन्नाथ मंदिर आणि भुवनेश्वरचं लिंगराज मंदिरही याच सुमारास बांधलं गेलेलं आहे.
सूर्यमंदिरावरची शिल्पकला अतिशय सुंदर आहे. अनेक कथा, प्रसंग त्या दगडी शिल्पांमधून जिवंत केलेले आहेत. मंदिराच्या पाठीमागे उषा आणि छाया (सूर्यदेवाची मंदिरे) आहेत.

यात समुद्रमंथनाचा देखावा आहे.

यात श्रावणबाळाची कथा आहे.

हे अजून एक वैशिष्ट्यपूर्ण शिल्प आहे. यात कलिंगाचा राजा हत्तीवर बसलेला दाखवला आहे आणि त्याला भेट म्हणून एक जिराफ नजर केलेला दाखवला आहे. जिराफ या आफ्रिकन प्राण्याचा जुन्या भारतीय शिल्पकलेतला हा एकमेव उल्लेख आहे. अरबी व्यापार्यांनी आफ्रिकेतून हा जिराफ आणून कलिंगाच्या राजाला नजर केला असावा.
जगमोहन प्रवेशद्वार (हा फोटो आहे - 1890,)
तर हा फोटो आहे २०२० चा

हे मंदिर दगडी असलं तरी दगड एकत्र ठेवण्यासाठी आत लोखंडी कांबींचा वापर केलेला आहे.

जगमोहनाचे जतन आणि स्थिरीकरण करण्याच्या प्रयत्नात, हॉलचा आतील भाग खूप पूर्वी विटांनी बांधला गेला आणि वाळूने भरला गेला, जी छतावरून छिद्र करून पोकळीत ओतली गेली. प्रवेशद्वाराच्या पायथ्याशी असलेल्या एका मोठ्या दगडावर असे शब्द कोरलेले आहेत:
' जुन्या भारतीय वास्तुकलेचा हा उत्कृष्ट नमुना जतन करण्यासाठी 1903 मध्ये बंगालचे आयएसओ लेफ्टनंट गव्हर्नर माननीय जेए बोर्डिलॉन यांच्या आदेशाने आतील भाग भरण्यात आला होता '
कोसळलेल्या मंदिरातली काही शिल्पं कोणार्कमधल्याच संग्रहालयात ठेवलेली आहेत.

काही मोठे दगडी भाग मंदिराच्या आवारात ठेवलेले आहेत. प्रचंड अवजड अशा लोखंडी कांबीही आहेत.
कोणार्कला जायचे कसे?
ट्रेन अथवा विमानाने भुवनेश्वर आणि तिथून मग बस (खाजगी बसेस सुटतात भुवनेश्वरहून). पुरी, कोनार्क एका दिवसात सहज होण्यासारखे आहे. भुवनेश्वर आणि पुरी इथे चांगली होवू शकेल. कोनार्कमध्ये काही विशेष हॉटेल्स नाहीत. भुवनेश्वरला राहणे उत्तम.
कोणार्कवरून पुरीला जाणारा रस्ता मात्र खूप सुंदर आहे. पूर्ण समुद्रकिनार्याच्या बाजूने हा रस्ता जातो. इथे वाटेमधे एका देवीच्या देउळ लागते. देवळाच्या आवारामधे एक डोल्फिनचा सांगाडा ठेवलाय. उग्र अशी कालीची मूर्ती आहे.हि कोळ्याची देवी आहे. त्यामुळे इथे देवीला प्रसाद म्हणून तळलेले मासे दाखवले जातात.
राउरकेला
राउरकेला हे ओरिसा मधील दुसरे सर्वात मोठे शहर आहे आणि हे भारतातील सर्वात मोठ्या स्टील प्लांट्सचे मुख्य ठिकाण, हे ठिकाण तुम्हाला त्याच्या काही अद्भुत पर्यटन स्थळांद्वारे त्याच्या समृद्ध सांस्कृतिक भूतकाळाची माहिती देते.
Read more at: https://hindi.nativeplanet.com/dhenkanal/#attractions
Read more at: https://hindi.nativeplanet.com/keonjhar/#overview
Read more at: https://hindi.nativeplanet.com/paradip/
Read more at: https://hindi.nativeplanet.com/karanjia/#overview
Read more at: https://hindi.nativeplanet.com/rourkela/#overview
Read more at: https://hindi.nativeplanet.com/jashpur/#attractions
Read more at: https://hindi.nativeplanet.com/kandhamal/#overview
Read more at: https://hindi.nativeplanet.com/balangir/#overview
Read more at: https://hindi.nativeplanet.com/kalahandi/#overview
Read more at: https://hindi.nativeplanet.com/jeypore/#overview
Read more at: https://hindi.nativeplanet.com/gopalpur/
Read more at: https://hindi.nativeplanet.com/berhampur/#overview























































































दरवर्षी डिसेंबरमध्ये इथे अभिजात भारतीय शास्त्रीय नृत्याचा समारोह होतो. यात ओडिसी शैलीचीही नृत्ये असतात. कोणार्क इथला नृत्य महोत्सवसुद्धा पाच दिवसात भरवला जातो. नृत्य महोत्सव आणि त्याच्याच बरोबर होणारा हा सॅण्ड आर्ट फेस्टिव्हल या दोन्ही उत्सवांची जगभरात नोंद घेतली जाते. भारतीयांसोबतच परदेशी पर्यटकसुद्धा याकाळात इथे आवर्जून उपस्थित राहतात. नृत्य महोत्सव बघायला आलेल्या रसिकांना तिथून दोनच किलोमीटरवर असलेला सॅण्ड आर्ट फेस्टिवलसुद्धा बघता येतो. दुपारपासून वाळूशिल्पे करण्याचे काम सुरु होते आणि ते जवळजवळ सूर्यास्तापर्यंत पूर्ण होते. या कलाकारांची कला मनसोक्त अनुभवून आपण तिथेच २ कि. मी. वर असलेल्या डान्स फेस्टिवलला जाऊ शकतो, नव्हे जायचेच असते. हे दोन्ही उत्सव हाच तर ओडीशाच्या कलेचा मोठा खजिना आहे. नृत्य महोत्सव हा संध्याकाळी ६ वाजता सुरु होतो. कोणार्कच्या सूर्यमंदिराच्या पार्श्वभूमीवर हा महोत्सव केला जातो. मोठ्या हिरवळीवर रंगमंच उभारलेला असतो आणि त्याच्यासमोर स्टेडीयम सारखी बसण्याची व्यवस्था केलेली असते. देशभरातून कलाकार या उत्सवात आपली नृत्यकला सदर करण्यासाठी येत असतात. शिवाय खास ओडिसी नृत्याचा कार्यक्रम तर ठरलेला असतोच. या कार्यक्रमासाठी तिकीट आहे. ही तिकिटे अनेक हॉटेल्समध्येही मिळतात नाहीतर कार्यक्रमाच्या ठिकाणी उपलब्ध असतातच. संपूर्ण अंधार आणि दिव्यांच्या रचनेमुळे उजळत जाणारे सूर्यमंदिर आणि त्याच्यासमोर होत असलेला हा नृत्य महोत्सव पाहून डोळ्याचे पारणे फिटते. ड्रोनद्वारे त्याचे होणारे चित्रीकरण आणि बाजूलाच असलेल्या दोन मोठ्या पडद्यावर दिसणारे त्याचे चित्रण फारच देखणे असते.
समुद्रावर वाळूत किल्ला करणे किंवा घर बांधणे हा प्रत्येकाचा अगदी आवडीचा खेळ असतो. केव्हा ना केव्हा आपण हा सुंदर खेळ वाळूत खेळलेला असेलही. पण याच खेळाचे शास्त्रोक्त आणि भव्य स्वरूप आपल्याला ओडिशा इथे या सँड आर्ट फेस्टिवल मध्ये बघायला मिळते. वाळूशिल्प ही कला त्यानिमित्ताने जागतिक पातळीवर गेलेली दिसते. ओडिशा सरकारच्या या उपक्रमामुळे कलाकारांना प्रोत्साहन आणि उत्तेजन दिले जाते. त्यांना एक व्यासपीठ उपलब्ध करून दिले जाते. पाच दिवस चालणाऱ्या या उत्सवात रोज एक संकल्पना घेऊन वाळूचे शिल्प करायचे असते. गेल्या वर्षी भुवनेश्वरमध्ये विश्वचषक हॉकीचे सामने खेळले गेले. त्यामुळे तिथे वारसा, महिला सक्षमीकरण, प्लास्टिकचा भस्मासुर यासोबत हॉकी ही सुद्धा संकल्पना ठेवलेली होती. प्रत्येक कलाकाराने या संकल्पनेनुसार शिल्प करायचे असते. त्यांना त्याच्यासाठी पाच तासांचा वेळ दिला जातो. वाळूशिल्पे करताना ती भुसभुशीत होऊ नयेत म्हणून मधून मधून त्याच्यावरती पाणी शिंपडले जाते. याकामी अनेक स्वयंसेवक कलाकारांना मदत करत असतात. पर्यटकांना सुद्धा वाळूशिल्पे कशी तयार केली जातात याचे प्रात्यक्षिक तिथे पाहता येते.
सॅण्ड आर्ट म्हणजे वाळू शिल्पकला हळूहळू भारताच्या विविध प्रांतात आता प्रसिद्ध होऊ लागली आहे. दरवर्षी इथल्या उत्सवामध्ये गुजरात, महाराष्ट्र, पश्चिम बंगाल, केरळ इथल्या कलाकारांचा सहभाग असतो. त्याचसोबत श्रीलंका, जपान, इटली, जर्मनी, स्पेन, नॉर्वे या देशातील कलाकार सुद्धा इथे हजेरी लावतात आणि आपली वाळूशिल्प कला सादर करतात. त्याचसोबत महाराष्ट्रातील काही कलाकार सुद्धा इथे आपली वाळूशिल्प कला सादर करण्यासाठी आवर्जून येतात. आपल्याकडे कोकण पर्यटनात वेंगुर्ला, देवगड, विजयदुर्ग, कुणकेश्वर इथल्या समुद्र किनाऱ्यावरसुद्धा वाळूशिल्पे साकारली जाऊ शकतात. मात्र आपल्याकडे सर्वथरात असलेली कमालीची उदासीनता याच्या मुळावर आलेली दिसते. ओडिशा सारखे छोटेसे राज्य आपल्याकडे असलेल्या वारशाचे इतके सुंदर मार्केटिंग करत असताना आपले राज्य मात्र त्याकडे साफ दुर्लक्ष करताना दिसते.
आणखी एक महत्त्वाचे म्हणजे एका खग्रास सूर्यग्रहणाचा मार्ग कोणार्कवरून गेला होता.
मायादेवी मंदिर

आज जे अवशेष दिसतात ते जवळजवळ पूर्णपणे वाळूने गाडले गेले होते आणि 20 व्या शतकाच्या सुरुवातीला उत्खनन करण्यात आले.. हे मंदिर, जे मुख्य मंदिरापूर्वी बांधले आहे असे मानले जाते, इथे बंदिस्त आवार आणि थोडी झाडी दिसते.
मंदिराच्या गर्भगृहाला पुजेनंतर पाणी जाण्यासाठी जो मार्ग असतो, त्याला तोंडात मासे असलेले मगरीचे डोके दिसते.
प्रचंड पुतळेहे ओडियाच्या शिल्पकलेचे उत्कृष्ट नमुने आहेत आणि यांच्यावर एकेकाळी प्लॅस्टर केलेले होते तसेच या पुतळ्यांना गडद लाल रंगात रंगवलेले होते असे मानले जाते.
विष्णू मंदिर
विष्णु मंदिर मुख्य सुर्य मंदीराच्या परिसराच्या दक्षिण-पश्चिम कोपर्यात आहे.हे छोटे मंदिर 1956 मध्येच सापडले. मंदिरात भगवान विष्णूची मुर्ती आहे, ज्यामुळे हे सिद्ध होते की कोणार्क येथे केवळ सूर्याचीच पूजा केली जात नव्हती. आज या मंदिराचे थोडे अवशेष दिसतात.
नवग्रह मंदिर (नऊ ग्रह मंदिर)
कोणार्क मंदिराच्या आवारातच हे एक नवग्रह मंदिर आहे. इथे अजून पूजा चालते. मात्र इथे जर गेलं तर खास ओरिसाच्या पंड्याचा अनुभव येतो. आठवड्यातून कधीही जा..आज अमुक वार है, अमुक ग्रहका वार. पूजा कराईये बस्स पाचसो रूपयेमे, आप दान धरम करेंगे तो गरीब ब्राह्मण भोजन करेगा.. " असे सांगून पैसे उलळले जातात. ओरिसामधे फिरताना या पंड्यापासून फार जपून फिरावे लागते. हातोहात लुटत जातात ते.

नवग्रह मंदिर ६ मीटर लांब, १.२ मीटर उंच आणि २ मीटर आकाराचे असून येथे एक प्रचंड दगडी शिळा ठेवण्यासाठी हे बांधले गेले. काळ्या क्लोराईट दगडात नऊ ग्रहांच्या मूर्ती कोरलेल्या आहेत; सूर्य, चंद्र, मंगळ, बुध, गुरु, शुक्र, शनि, राहू आणि केतू. नवग्रहदेवता कोरलेल्या एका प्रचंड आडव्या तुळईसारख्या शिळेला नवग्रहशिळा म्हणतात. ही नवग्रहशिळा मंदिराचे रक्षण करते असे मध्ययुगीन स्थापत्यात मानले जात होते ओदिशातील बहुतेक मंदिरात प्रवेशद्वारापाशीच अशी नवग्रहशिळा दिसून येते. मुख्यशाळेच्या म्हणजेच जगमोहनच्या समोरील दरवाज्यावर सुमारे १८ फुटांवर एक सजलेली नवग्रहशिळा बसवलेली होती. क्लोराईटची ही शिळा १९ फूट १० इंच लांब, ४ फूट ९ इंच रुंद आणि ३ फूट ९ इंच उंच आहे आणि हिचे मूळ वजन २६.२७ टन होते. इ. स. १६२८ मध्ये खुर्दाच्या तत्कालीन मांडलिक राजाने (याचे नाव देखील नरसिंह देव असे होते) ती दुसरीकडे नेण्याचा प्रयत्न केला होता.
"नवग्रहशिळेवरील प्रतिमा कोरण्याचे काम मात्र नीट केलेलं नाही. बर्याच प्रतिमा समूहाने एकाच आकारात बनवलेल्या वाटतात. बहुतेक मूर्तींच्या हातात जपमाळ आणि कमंडलू असून उंच टोकदार मुकुट घालून कमळावर बसलेल्या दिसतात. पुराणात याचे स्पष्टीकरण सापडते.
कठोर काळाच्या फेर्यातून मात्र नवग्रहशिळा देखील काही सुटली नाही आणि फार काळ ती आपल्या जागी स्थिर राहू शकली नाही. १९व्या शतकाच्या शेवटी बंगाल एशियाटिक सोसायटीच्या सभेच्या वेळी समुद्रतीरापर्यंत ट्रामगाडीची सेवा सुरू करताना बंगाल सरकारने शिळा कलकत्त्याला नेण्याचा प्रयत्न केला. परंतु जेमतेम २०० फूट ती वाहून नेल्यावर त्यांच्याकडील निधी संपून गेला. नंतर पुन्हा काही वर्षांनी तसाच प्रयत्न झाला. वाहून नेणे सोपे जावे म्हणून शिळेचे दोन भाग करण्यात आले. तरीही प्रचंड वजनामुळे आणि वालुकामय मार्गामुळे ती काही हालवता आली नाही. शेवटी दोन फर्लांगावर ती सोडावी लागली. इथे ती साठ वर्षांपेक्षा जास्त काळ पडून होती. अगदी अलीकडे भारत सरकारने कोणार्क मंदिराच्या आवाराजवळच एका मंडपात तिची स्थापना केली. सध्या शिळेचा मोठा भाग आवाराबाहेर आग्नेय दिशेला आहे. आतां दर शनिवारी तसेच मकरसंक्रातीला अनेक लोक या शिळेची म्हणजे नवग्रहांची होमहवनादी पूजा करून नैवेद्य अर्पण करायला कोणार्कला जमतात. " अशी माहिती मिळते .
कोणार्कला भेट देणार्यांपैकी ९९% लोक नवग्रह मंदिर हे मंदिर भेट देत नाहीत.सुर्य मंदीर संकुलाच्या अगदी उत्तरेला हे मंदीर आहे.मुख्य आवारातून बाहेर पडल्यानंतर लगेच डावीकडे वळून इथे पोहोचू शकता.
कुशभद्रा नदीच्या किनार्यावर हे रामचंडी मंदिर आहे. या मंदीरात रामचंडी देवीची मुर्ती असून ती कोणार्क क्षेत्राची रक्षक देवता मानली जाते.
नृसिंहनाथ :-
ओडीशाच्या सहलीत ओडीशा राज्यात असलेले पण छत्तीसगडची राजधानी रायपुरपासून जवळ असलेल्या नृसिंहनाथ ( स्थानिक उच्चार नरसिंगनाथ ) आणि हरिशंकर या दोन मंदीराना भेट देता येईल. रायपुरला मुक्काम करुन बसने किंवा टॅक्सीने चार तासाचा प्रवास करुन नृसिंहनाथला जाता येते. राहायला इथे ओरिसा पर्यटन खात्याचे यात्री निवास आहे. मात्र फारसे स्वच्छ नाही. मंदिराचे अतिथी निवास मात्र बरे आहे. खोलीचे भाडे नाममात्र आहे. मंदिराला देणगी पण द्या म्हणाला. जेवणाला हॉटेले नाहीतच. फक्त टपर्या. त्याही ग्रामीण. पण अगदीच गलिच्छ. स्वच्छतेचे तसे वावडेच. त्यापेक्षा मंदिरातच ‘भोग’ चे जेवण मिळते ते जेवणे सोयीचे. जेवणाची वेळ दुपारी १२.०० आणि रात्री ८.००. मंदिरातल्या आवारात फलकावरही ही वेळ लिहिलेली आहे.पवित्र अशा गंधमादन पर्वतराजीत वसलेले हे मदीर आहे आहे. इथे गंधमर्दन असे म्हणतात. इ.स. १३१३ साली पाटण्याचा गर्ग राजा बैजल सिंह देव याने या ऐतिहासिक मंदिराचा पाया घातला.
आता नृसिंहमंदीरमहात्म्य. सुमारे सहाशे वर्षांपूर्वी जमुना कंधुनी नावाच्या एका साध्वीने ‘नृसिंह चरित्र’ नावाचे स्तोत्र रचले. या स्तोत्रात मार्जार केसरीची थोरवी वर्णिली आहे. मूषकासूर नावाचा एक दैत्य फार मातला होता आणि तो जनतेचा फार छळ करीत असे. विष्णूने मग मार्जार केसरी म्हणजे नृसिंहावतार घेतला आणि तो मूषकाला खायला धावला. परंतु बिळात शिरलेला मूषकासूर काही बाहेर येईना. बिळाची आणि बिळाबाहेर वाट पाहाणार्या मार्जारकेसरीच्या प्रतिमा आजही दिसतात. या पुराणकथेसाठी हे मंदीर ख्यातकीर्त झालेले आहे.
या भूमीत गाडल्या गेलेल्या परंतु त्या काळापासून दुष्ट शक्तीपासून जनतेचे रक्षण करणार्या नृसिंहाचे प्रतीक म्हणून हे मंदीर आहे. मंदिराबद्दल इतरही अनेक आख्यायिका ज्ञात आहेत.
सुमारे ४५ फूट उंच असलेले हे मंदीर दोन भागात विभागलेले आहे. सिंहद्वारातून आपण मंदिराच्या आवारात शिरतो.
इथे आपण सिंहद्वाराकडे आत प्रवेश केलेला असतो. मार्गिकेमधून सरळ गेल्यावर पुढे आणखी एक प्रवेशद्वार दिसते
दुसरे आतले प्रवेशद्वार
तर डाव्या बाजूला उतरायला घाटाच्या पायर्या. खाली उतरणार्या घाटाच्या पायर्या आपल्याला नेतात. दोन गोमुखातून येणार्या सुंदर झर्याच्या काठी. असे हे निसर्गसुंदर स्थान आहे.
गोमुखातून येणारा झरा
झर्याच्या किनारी काही छोटेखानी मंदिरे आणि शिल्पे
सुरेख छोटेखानी मंदिरे आणि शिल्पे
आणि काही पुरातन मंदिराचे जीर्ण भग्नावशेष.
मंदिराचे भग्नावशेष
डोंगर उतारावर असल्यामुळे मंदिरात आपोआप मजले निर्माण झालेले. एवढी सुंदर मंदिरे का बरे सोडून द्यावी लागली असावीत? असा प्रश्न पडतो. सोडून दिल्यामुळे पडली असावीत की पडझड झाल्यामुळे सोडली असावीत? की लुटल्यावर बाटवल्यामुळे अगोदर सोडली आणि मग पडझड झाली? की आक्रमकांनी फोडली? या सर्व प्रश्नाची उत्तर द्यायला मार्गदर्शक उपलब्ध नाहीत. इतिहासाच्या मौनामुळे खिन्न वाटते.
पायर्या चढून मार्गिकेमधून पुढे येऊन पुढील प्रवेशद्वारातून सरळ समोर पाहिले तर मंदिराच्या डाव्या बाजूने पुढे सरळ गेल्यावर डोंगराच्या कडेकडेने चढत चढत वळण घेत बर्याच पायर्या वरवर जातात.
डोंगरावर जाणार्या पायर्या
डावीकडे लहानसा धबधबा. या धबधब्यातलेच पाणी झर्याच्या रूपाने खाली गोमुखातून जात होते. डोळ्यांचे पारणे फिटावे असे दृश्य. प्राचीनत्त्वाचे व्यक्तिमत्त्व ल्यालेला, काहीसा राकट पण अस्सल रांगडा निसर्ग.
छोटा धबधबा
तर मार्गिकेच्या उजव्या बाजूला गोलाकार पायर्या वर गेलेल्या. वर गर्भगृहावरचे वैशिष्ट्यपूर्ण रेखा देऊळ.
वर जाणार्या पायर्या
रेखा देऊळ
रेखा देऊळ पाहून सार्थक होते. रेखा देऊळच्या बाजूला डोंगरातल्या दगडात खोदलेली काही शिल्पे. पण काही खास नव्हती. शिल्पांच्या बाजूने पण काही पायर्या वर गेलेल्या दिसतात.
या स्थळाचा मिळालेली माहिती, महिमा खालीलप्रमाणे:
१. मंदिराच्या परिसरात कावळा दृष्टीला पडत नाही.
२. नृसिंहाच्या जन्मदिनी नृसिंह चतुर्दशीला जमुना कंधुनीने अर्पिलेल्या कंदाचा नैवेद्य दाखवतात.
३. दुर्मिळ अशा आयुर्वेदिक दिव्यौषधी इथे बारमास मिळतात. खरेच इथे ज्येष्ठमध, अश्वगंध, ब्राह्मी, जटामांसी, शिकेकाई, पिंपळी, वगैरे आणि फार माहिती नसलेल्या अनेक औषधी वनस्पती रस्त्यावर विकायला उपलब्ध दिसतात.
४. दररोज तसेच यात्रांच्या दिवशी इथे दुर्मिळ वनौषधींचा बाजार भरतो.
५. इथून हरिशंकर पहाडावर ट्रेकिंग करीत जाता येते.
६. सुंदर गुलाब असलेली बाग इथे आहे.
७. मंदिराच्या उत्पन्नाचा ५ टक्के हिस्सा हा खून झालेल्यांच्या कुटुंबियांच्या मदतीसाठी वापरला जातो. ही प्रथा तेव्हांचे सहाय्यक आयुक्त श्री प्रमोद कुमार राऊतराय यांनी सुरू केली.
८. गोवध, मांजर मारणे वा सर्पहत्या अशा पापांबद्दल प्रायश्चित्त देऊन पापक्षालन केले जाते.
९. पिंडदान इ. कार्यासाठी या पवित्र ठिकाणाला छत्तीसगडची गंगा असे म्हणतात.
१०. दुर्मिळ अशी लालतोंडी माकडे इथे आढळतात.
११. इथे अष्टभुज गणेश आहे.
१२. अप्रतिम निसर्गसौंदर्य.
१३. अकरा जिवंत झरे आहेत.
१४. औषधी वनस्पतींच्या लागवडीचे केंद्र इथे आहे.
१५. थंडगार छाया असलेले विस्तीर्ण आवार आहे.
प्रेक्षणीय स्थळांची अंतरे खालीलप्रमाणे:
१. पैकमल ते नृसिंहनाथ ४ किमी.
२. सिंहद्वार ते मंदिर ० किमी.
३. मंदीर ते चलधार धबधबा ४०० मी.
४. मंदीर ते भीमधार ४२५ मी.
५. मंदीर ते सीताकुंड ५०० मी.
६. मंदीर ते मन्हुपांडव १.५ किमी.
७. मंदीर ते कपिलधार ४ किमी.
८. मंदीर ते सप्तधार ७ किमी.
९. मंदीर ते सत्यांब ९ किमी.
१०. मंदीर ते भीममध्व ११ किमी.
११. मंदीर ते सुखस्थळ (हॅपी पॉईंट) घाटमाथा १२ किमी.
१२. मंदीर ते शिकारस्थळ हंटिंग प्लेस. १३ किमी.
१३ मंदीर ते हरीशंकर १८ किमी.
रामायणातील कथेनुसार युद्धात मूर्छित झालेल्या लक्ष्मणावर उपचार करण्यासाठी आवश्यक ती औषधी वनस्पती हनुमानाला ओळखता न आल्यामुळे हनुमानाने अख्खा गंधमादन पर्वतच आपल्या खांद्यावर उचलून आणला अशी कथा बहुतेक सर्वांनाच ठाऊक आहे. त्यामुळे या स्थानाला महत्त्व आलेले आहे. हे अतिशय निसर्गरम्य असे ठिकाण आहे आणि जरी दुर्गम असले तरी इथे येतांनाचा प्रवास हा नयनरम्य आहे.
सध्याचे देवालय हे पापहारिणी या ओढ्याच्या उगमापाशी आहे. अतिशय प्राचीन अशा स्थळी हे मंदीर १४व्या शतकात बांधले. जगमोहनचे चार खांब साक्ष देतात की पूर्वीचे मंदीर ९व्या शतकात बांधले होते. तर प्रवेशद्वाराच्या सुरेख चौकटी ११व्या शतकातील आहेत.
समोर डोंगरात वर जाणार्या पायर्या चढून पुन्हा परत जातांना उतरायला एक तास लागतो. पवित्र अशा या यात्रास्थळी पादत्राणे घालायची परवानगी नसल्यामुळे नाजुक पावले असलेल्यांनी पावलांना इजा होऊं नये म्हणून पायात जाड मोजे घालावेत. दोनअडीचशे तरी पायर्या आहेत. वर डोंगरमाथ्याजवळ दोनचार छोटीशी मंदिरे होती.
डोंगराच्या पलीकडच्या टोकाच्या उतारावर हरीशंकर मंदीर वसले आहे. दोन मंदिरांच्या मध्ये १६ किमी लांबीचे पठार आहे. पठार बौद्ध भग्नावशेषांमुळे भकास झालेले आहे. संशोधकांच्या मते हे भग्नावशेष हे परिमलगिरी या प्राचीन बौद्ध विद्यापीठाचे आहेत. चिनी प्रवासी युआन श्वांग किंवा ह्युएन त्सॅंग याने या विद्यापीठाचा पोलोमोलोकिली असा या विद्यापीठाचा उल्लेख केलेला आहे. या पठारावरचा प्रवास तसा दीर्घच आहे परंतु इतिहासाच्या अभ्यासकांसाठी अविस्मरणीय असा आहे.
हरीशंकर सिंहद्वार
नृसिंहनाथमध्ये जमिनीवर फरशी आणि कोबा आहे तर इथे खाली फरशी तर वर मुख्य मंदिराकडे काळा स्वच्छ ग्रॅनाईट. ठिकाण नृसिंहनाथसारखेच डोंगरावरचे आणि निसर्गरम्य, मन प्रसन्न, टवटवीत करणारे.
हरिशंकर
हरिशंकर मंदिरातला हनुमान
हरीशंकरचा धबधबा आणि झरा
एक सुंदर पूल देखील
आणि देखणी शिल्पे
मंदिराबाहेर मिठाई, चिकी, खेळणी, सरबते, खाद्यपदार्थ वगैरेंच्या टपर्यांच्या ओळीत छोटी संत्री, आवळे, बोरे, भाजी, वनौऔषधी वगैरे गावरान मेवा विकायला असलेला दिसतो. संबळपूरच्या रस्त्याला लागूनच एक अभयारण्य लागते.
हरीशंकरजवळची हरणे
संबलपूर :-
संस्कृती आणि नैसर्गिक सौंदर्याने समृद्ध असलेली संबलपूर हे ओरिसामधील सर्वात महत्वाचे पर्यटन स्थळांपैकी एक आहे. पश्चिम ओरिसाचे प्रवेशद्वार, या भूमीला निसर्गाच्या काही सर्वोत्कृष्ट देणग्या म्हणजे हिरवीगार जंगले आणि नयनरम्य धबधबे. संबळपुरच्या हवामानाचा विचार केला तर इथे उन्हाळा कडक, तीव्र हिवाळा आणि धुंवाधार पाउस असतो. संबळपुर शहर रेल्वे आणि रस्ताने जोडले गेले आहे.हिरा सापडणारे क्षेत्र
संबळपुरच्या परिसरात पर्यटन स्थळ म्हणजे महानदी आणि तीच्यावरील हिराकुड धरण, सामलेश्वरी मंदीर, हुमा येथील झुकलेल्या शिखराचे मंदीर, चिपलिमा जलविद्युत प्रकल्प, घंटेश्वरी मंदीर अशी बरीच आहेत. इथून जवळ देवीगड अभयारण्य आहे.या पानगळीच्या जंगलात वन्य प्राणी मोठ्या प्रमाणात आहेत. याशिवाय अन्य पर्यटन स्थळात मवेशी द्वीप, उषा कोठी, कंधरा, हाथी बाडी आणि विक्रम खोल ही ठिकाणे आहेत. समलेश्वरी देवीचे मंदीर फार सुंदर आहे. या देवीवरूनच शहराला संबळपूर हे नाव पडले.
संबळपुर परिसराची भटकंती करण्यासाठी आपण हिराकुड धरणाकडे निघूया. संबळपूरच्या रस्त्यावर संबळपूरनजीक बुर्ला नावाचे एक छोटेसे शहर लागते. हिराकूड धरणाचे दुसरे टोक बुर्लाला आहे. म्हणजे नदीच्या एका किनार्याला हिराकूड तर दुसर्या तीरावर बुर्ला. बुर्ला अगदी छोटेसे शहर आहे. इथे फार सुविधा नाहीत. संबळपूर तिथून दहापंधरा किमी.वर आहे. पद्मपूरपासून संबळपुर १७४ मी. किमी. अंतर आहे.
कटक/भुवनेश्वरला जाणार्या बसेस मुख्य शहरातून मिळतात. ते या महामार्गापासून साडेतीनचार किमी. आहे. तिथे लक्ष्मी टॉकीज या भागातून कटक/भुवनेश्वरला आणि इतर ठिकाणी जायला बसेस सुटतात. तिथे टेंपोने जावे लागते. एकेका शहराची परिभाषा वैशिष्ट्यपूर्ण असते. टेंपो म्हणजे किंचित मोठी ऑटोरिक्षा. पुण्यात सहा आसनी असते तेवढी नाही. पण किंचित मोठीच. तिथे जायला भाडे रु. ४०.०० आणि रात्री आठनंतर दीडपट म्हणजे रु. ६०.००. पण संबळपूर कटक अंतर जवळजवळ २५० किमी. पेक्षा जास्त असल्यामुळे शक्यतो बसनेच जा. मात्र बसेस रात्रीच असतात. संबळपूरहून कटक/भुवनेश्वरला जायला रेल्वे सुध्दा आहे.
झुकलेले शिवमंदीर
हुमा येथील झुकलेले मंदीर.
येथील खास जातीचे मासे आहेत कुडो मासे. कुडो मासे हे शिवाच्या मालकीचे समजले जातात म्हणून कोणी खात नाहीत. हे मासे खूपच माणसाळलेले आहेत. मंदीराजवळ स्नान करणार्या यात्रिकांच्या हातून खाऊ देखील घेतात. पवित्र दिवशी कांही माशांची नावे घेऊन त्यांना बोलावून प्रसाद दिला जातो.

महानदीचे पात्रआता मुख्य आकर्षणाबद्दल. झुकलेले मंदीर. ओरिसा पर्यटन खात्याने केलेल्या संशोधनानुसार मंदीर झुकण्याबाबतच्या त्यांच्या प्रश्नांना कोणीही समाधानकारक उत्तर देऊं शलेले नाही. आश्चर्याची गोष्ट म्हणजे मुख्य मंदीर एका बाजूला झुकले आहे तर इतर उपमंदिरे विरूद्ध बाजूला. मंदिराच्या आवारातील प्रत्येक वास्तू झुकलेली आहे. गेल्या ४०-५० वर्षात झुकण्याचा कोन बदललेला निदान नुसत्या डोळ्यांना तरी दिसत नाही असे म्हणतात. गावकर्यांकडून तसेच पुजार्यांकडून मिळालेल्या माहितीनुसार खरे तर इटलीतील पिसाला आहे तशी अचूक कोन मोजण्याची यंत्रणाच इथे नाही. त्यामुळे कोन नक्की बदलला की नाही हे कळत नाही. परंतु याला काही तरी भूगर्भीय कारण असणारच. भूस्तर वेडावाकडा असू शकेल. ही सगळी होती मिळवलेली माहिती. कदाचित चमत्काराच्या प्रसिद्धीसाठी मंदीर मुद्दामच ओळंब्याशी कोन करून बांधले असेल.
पण मंदीर पाहिले आणि विरस होतो. भव्यता अजिबात नाही. जेमतेम चारपाच मजली इमारतीएवढी उंची. परिसर तसा उजाड, अनाकर्षक आणि थोडाफार बकालच. मंदिराचे रचनासौंदर्य कुठे जाणवले नाही. हिंदू धार्मिक यात्रास्थानी पूर्वी हमखास आढळणारा गचाळपणा अजूनही इथे आहे. आकर्षक रंगरंगोटी सोडा, साधी स्वच्छता देखील समाधानकारक नाही. पर्यटक इथे का आणि कशाला पुन्हा येतील? फक्त बोटावर मोजण्याइतके स्थानिक दर्शनेच्छु दिसतात. एक प्रेक्षणीय स्थळ म्हणून तशी निराशाच पदरी पडते.
हिराकूड धरण
हिराकुड धरण प्रकल्प हा स्वतंत्र भारतातील पहिला नदी खोरे प्रकल्प आहे.हे धरण हे जगातील सर्वात लांब धरण आहे जे सुमारे 26 किमी पसरलेले आहे जे स्वतंत्र भारताच्या अजोड,अजेय तांत्रिक कामगिरीचे उदाहरण म्हणून अभिमानाने उभे आहे.हे धरण ज्या महानदीवर आहे ती अंदाजे ८५८ किमी लांबीची एक मोठी नदी आहे जी छत्तीसगड आणि ओडिशा या राज्यांतून वाहते आणि मध्य प्रदेश थोडे अंतर वाहते. या महानदीमुळे ओडिशात पूर वारंवार येतात, त्यामुळे महानदीला “ओडिशाचे दु:ख” असे कुप्रसिद्ध नाव आहे. विशेषत: मुसळधार पावसाच्या वेळी नदीच्या पाण्याचा प्रवाह साधारणपणे गंगेच्या प्रवाहासारखा असतो तेव्हा नदीच्या विनाशकारी महापूरांवर नियंत्रण ठेवणे अत्यावश्यक होते. त्यामुळे हिराकुड धरण प्रकल्पाचा प्रस्ताव सर एम विश्वेश्वरय्या यांनी मांडला आणि १९४८ मध्ये बांधकामाला सुरुवात झाली आणि धरणाचे उद्घाटन १९५३ मध्ये भारताचे पहिले पंतप्रधान पं. जवाहरलाल नेहरू यांच्या हस्ते झाले. धरणाच्या ओलित क्षेत्रात ७५००० चौ.कि.मी. जमीन येते. त्यात पूराचे पाणी सोडण्यासाठी ९८ फ्लड गेट्स, ६४ स्लाइडिंग गेट्स आणि ३४ क्रेस्ट गेट्स आहेत, यामुळे ते जगातील सर्वात लांब धरण बनले आहे. हिराकुड धरण हा १000 दशलक्ष रुपये खर्चाचा प्रकल्प आहे ज्याची आजच्या तारखेला किंमत सुमारे 500 अब्ज रुपयांचा असेल.ओडिशा ही सुपीक जमीन असली तरी चांगल्या हवामानाव्यतिरिक्त जमिनींना पिकांच्या सिंचनासाठी भरपुर पाण्याची आवश्यकता असते. खरीप आणि रब्बी पिकांच्या लागवडीसाठी १,०९४,९५३ एकर जमिनीला सिंचन देण्याचा अंदाज असला तरी, सध्या हिराकुड धरण २६७,८५२ एकर रब्बी पिकांना आणि ३८४,५८२ एकर बरगढ, बोलंगीर, संबलपूर आणि सुबर्णपूर जिल्ह्याच्या खरीप पिकांना पाणी पुरवते. धरण आणि नदीच्या पाणी व्यवस्थापन प्रणालीमध्ये सुधारणा करण्याचे अनेक प्रयत्न अजूनही केले जात आहेत. या धरणातून सिंचनाबरोबर हायड्रो-इलेक्ट्रिकल प्लांट्सद्वारे जलविद्युत निर्मिती केली जाते. बुर्ला आणि चिपिलीमा येथे दोन प्रमुख ऊर्जा प्रकल्प आहेत.या धरणातून ३०७.५ मेगावॅट वीजनिर्मिती होते.
हिराकुड धरण पहाण्यासाठी पर्यटकांची बर्यापैकी गर्दी असते. धरणाच्या प्रवेशद्वराजवळ नेहरु मनोरा दिसतो. इथून पुढे सुरक्षिततेच्या कारणास्तव प्रकाशचित्रे काढायला मनाई आहे. तशी पाटी उडिया, हिंदी आणि इंग्रजीत लिहिलेली आहे. पण पर्यटक सर्रास आपापले भ्रमणध्वनी सरसावून एकमेकांचे फोटो घेताना दिसतात. घातपाताच्या धोक्याचे आणि सुरक्षितता नियमांचे गांभीर्य ना पर्यटकांना, ना पहारेकर्यांना.
भीतरकनिका राष्ट्रीय उद्यान:-
ओडीशातील केंद्रपाड़ा जिल्ह्यामध्ये आहे. घनदाट आणि वर्षावनाचा हा प्रदेश ६७२ स्क्वे.कि.मी.मध्ये पसरलेला आहे. ब्राह्मणी, बैतरनी आणि धामरा नदीच्या मुखाशी हा प्रदेश आहे. याच्या पुर्व बाजुला गाहिरमथा बीच आहे. या अभयारण्यात खार्या पाण्यातील मगरी (क्रोकोडिलस पोरोसस), पांढर्या मगरी, भारतीय अजगर आणि मोठ्या प्रमाणात पक्षी आहेत. पक्ष्यांच्या २१५ जातींची इथे नोंद केली आहे. याशिवाय जंगली डुक्कर, र्हिसस वानरे, चितळ, नाग, पाण्यत रहाणारी पाल असे इतर जीव दिसतात. याशिवाय या अभयारण्यातील समुद्रकिनारी ऑलिव्हर रिडले (लेपिडोचेलिस ओलिवासिया) या जातीची कासव अंडी घालतात. या अभयारण्याची निर्मिती १९७५ मध्ये केली होती तर सप्टेंबर १९९८ मध्ये इथे कोअर झोन ठरवला गेला.
या अभयारण्यात फेरफटका नावेतून केला जातो. इथे प्रवेश करण्यासाठी खोले गेट हे प्रमुख प्रवेशद्वार आहे तर गुप्ती गेटने देखील इथे जाता येते. काही वर्षापुर्वी इथे जवळपास पर्यटन नव्हते.मात्र इथली समृध्द जीवविवीधता पहाता ओडीशा पर्यटन विभागाने मोठ्या प्रमाणात सुविधा पुरवल्या.
या परिसरात कच्छ वनस्पति, सुंदरी, थेस्पिया, कासुअरिना असे वृक्ष आणि नील झाड़ी आणि अन्य प्रकारचे गवत दिसते. हे अभयारण्य कनिकाच्या राजाचा शिकारखाना होता.इथे त्याकाळचे वॉच टॉवर आणि खंदक दिसतात. तसेच इथे मध्ययुगीन मंदीर देखील आहे.

भितरकनिका अभयारण्याला रामसर साईट म्हणून घोषीत केले आहे.यानिमीत्ताने रामसर साईट म्हणजे काय ? हे समजून घेउया.रामसर साईट्स म्हणजे काय ? त्या कोणत्या ?
निसर्गातील चमत्कार, वेगळेपण दाखवणाऱ्या अनेक वास्तू, ठिकाणे या पृथ्वीतलावर पाहायला मिळतात. काही नैसर्गिक आहेत, तर काही कृत्रिम; पण जैवविविधतेच्या दृष्टीने यांचे महत्त्व कायम आहे. पर्यावरण संवर्धनाच्या दृष्टीने या वास्तूंची आणि ठिकाणांची वैशिष्ट्ये लक्षात घेऊन त्यांना एक वेगळा दर्जा देण्यात आला आहे. कोणती आहेत ही ठिकाणे ? केव्हा ठरले या संदर्भात? आदीसंदर्भात माहिती देणारा हा लेख…
१९७१ मध्ये इराणमधील रामसर या ठिकाणी पाणथळ जागांच्या संदर्भात एक परिषद झाली होती. या परिषदेत सहभागी देशांनी पाणथळ जागांच्या संवर्धनासंदर्भातील करारावर सह्या केल्या होत्या. १९७५ मध्ये युनेस्कोने यात सहभाग नोंदवत संवर्धनासाठी काम केले. सध्या जवळपास सुमारे १७१ देशांचा रामसर परिषदेमध्ये सहभाग असतो. भारताने रामसर परिषदेमध्ये १९८२ पासून सहभाग नोंदविला आहे.
१९६० मध्ये युरोपात पाण्याच्या साठ्यात मोठ्या प्रमाणात घट होत असल्याचे लक्षात आले. ही एक आंतरराष्ट्रीय समस्या आहे, असे लक्षात घेऊन १६९२ मध्ये मार्शलॅन्ड आणि पाणथळ जागांच्या संवर्धनासाठी एमएआर परिषद भरवण्यात आली. येथूनच खऱ्या अर्थाने संवर्धनासाठी प्रयत्न सुरू झाले. त्यानंतर १९७१ मध्ये रामसर परिषद घेण्यात आली. यामध्ये पाणथळ जागा संवर्धनाचे आंतरराष्ट्रीय महत्त्व विचारात घेऊन अठरा देशांनी संवर्धनावर सहमती दर्शवली. १९७४ मध्ये ऑस्ट्रेलियातील कोबोर्ग पेन्युसुलाच्या संवर्धनाचा निर्णय घेण्यात आला. जगातील ही संवर्धनासाठी निवडण्यात आलेली पहिली पाणथळ जागा ठरली. ती जागा रामसर साईट्स या नावाने जाहीर करण्यात आली.
भारताने १९८२ मध्ये यामध्ये सहभाग नोंदविला. आत्तापर्यंत भारतातील ४२ पाणथळ जागांचा रामसर साईट्समध्ये समावेश करण्यात आला आहे. जवळपास सुमारे १० लाख ८१ हजार ४३८ हेक्टर इतके क्षेत्र यामध्ये मोडते. यात १ लाख १६ हजार ५०० हेक्टर क्षेत्रावर व्यापलेले ओरिसातील चिलिका सरोवर हे भारतातील सर्वांत मोठे रामसर साईट्सचे क्षेत्र आहे, तर अवघ्या २० हेक्टरवर व्यापलेले हिमाचल प्रदेशातील रेणुका वेटलॅंड हे भारतातील सर्वांत लहान रामसर साईट आहे. चिलिका सरोवर आणि राजस्थानमधील केवलादेव राष्ट्रीय उद्यान भारतातील पहिल्या रामसर साईट्स आहेत. उत्तर प्रदेशातील सर्वाधिक आठ जागांना रामसर साईट्सचा दर्जा देण्यात आला आहे.
अशा आहेत भारतातील रामसर साईट्स
असन राखीव संवर्धन (उत्तराखंड)
अष्टमुडी वेटलॅंड (केरळ)
बीन्स राखीव संवर्धन (पंजाब)
भीतरकनिका मॅनग्रो (ओरिसा)
भोज सरोवर (मध्यप्रदेश)
चंद्राताल (हिमाचल प्रदेश)
चिलिका सरोवर (ओरिसा)
दिपोर भील (आसाम)
पूर्व कोलकत्ता वेटलॅंड (पश्चिम बंगाल)
हरिक वेटलॅंड (पंजाब)
होकेरा वेटलॅंड (जम्मू-काश्मीर)
कबरताल वेटलॅंड (बिहार)
कांजली वेटलॅंड (पंजाब)
केवलादेव राष्ट्रीय उद्यान (राजस्थान)
केशोपूर मिनाई (पंजाब)
कोल्लेरू तलाव (आंध्रप्रदेश)
लोकतक लेक (मणिपूर)
लोणार लेक (महाराष्ट्र)
नालसरोवर पक्षी अभयारण्य (गुजरात)
नंदूर माधमेश्वर (महाराष्ट्र)
नांगल वन्यजीव अभयारण्य (पंजाब)
नवाबगंज पक्षी अभयारण्य (उत्तर प्रदेश)
पार्वती आग्रा पक्षी अभयारण्य (उत्तर प्रदेश)
पॉईंट कॅलिमेरी वन्यजीव आणि पक्षी अभयारण्य (तमिळनाडू)
पॉंग डॅमलेक (हिमाचल प्रदेश)
रेणुका लेक (हिमाचल प्रदेश)
रोपर वेटलॅंड (पंजाब)
रुद्रसागर लेक (त्रिपुरा)
सामान पक्षी अभयारण्य (उत्तर प्रदेश)
समासपूर पक्षी अभयारण्य (उत्तर प्रदेश)
सांबर लेक (राजस्थान)
संडी पक्षी अभयारण्य (उत्तर प्रदेश)
सारसी नवर झिल (उत्तर प्रदेश)
सासथामकोट्टा लेक (केरळ)
सुंदरबन वेटलॅंड (पश्चिम बंगाल)
सुरिनसार मन्सूर लेक (जम्मूृ-काश्मीर)
सुर सरोवर (उत्तर प्रदेश)
सोमिरिरी (जम्मू-काश्मीर)
तुसो कर (लडाख)
अप्पर गंगा नदी (उत्तर प्रदेश)
वेमबंदकोल वेटलॅंड (केरळ)
उलर लेक (जम्मू-काश्मीर)
– राजेंद्र कृष्णराव घोरपडे
मोबाईल 9011087406
Famous Places of Angul District of Odisha ( Orissa ) See Nalco and Thermo Electric Power Plant and Enjoy Tikarapada Wild Life Sanctuary, Satakosia
In South : Nayagarh
South - West : Baudh
West : Sambalpur
West - North : Deogarh
North - West : Sundergarh
North - East : Keonjhar
East : Dhenkanal
South - East : Cuttack
Angul is one of districts of Orissa a state of India. The city Angul is the district head quarter. Angul is popular as industrial capital of Orissa and modern out look of people.
If you see map of Orissa the Angul, will be seen at the heart of the Orissa is an integral part of the state sharing the rich modern culture, tradition and socio-economic development of the state. This district was formally formed out of the former undivided Dhenkanal district on the date of April 1, 1993 . Angul district lies between 20° 31 N & 21° 40 N latitude and 84° 15 E & 85° 23 E longitude.
The district has a total area of 6232 sq. km.
Population of 11, 39,341 as per 2001 census
Males - 5, 86,903,
Females - 5, 52,438
Population Density : 179 per sq. km.
It is sorrounded by Dhenkanal and Cuttack districts in the east, Deogarh, Kendujhar and Sundargarh in north, Sambalpur and Sonepur in west and Bauda and Nayagarh in the south side.The district is abundant with minerals and natural resources, which ultimately help the district to contribute maximum amount of revenues to the state and central government. Angul, The district headquarters is about 150 kilometers from the state capital Bhubaneswar. It is situated on the National Highway No 42, making it well accessible from all parts of the state. The East Coast Railways is also passed in this district connecting Bhubaneswar and Sambalapur and ultimately every corner of India.
Anugul - You can visit Budhi Thakurani Temple built on a small hill and Recently a huge Jagannatha Temple known as Saila Srikhetra has also been built near the Budhi Thakurani temple. This Temple is made as the exact replica of Puri Jagannath Temple and is very popular all over the state.
Tikarapada: It is 60 km from Angul, Gharial Crocodile Sanctuary and Satakosia George of river Mahanadi around lush green forest. Visit Tikarapada Wild Life Sanctuary
Bhima Kunda- This is another tourist place of Angul district, situated about 28 kilometers from the town of Talcher. One can see the sleeping statue of Lord Vishnu on the river bed of Bramhani.
Nalco: Beautiful Industrial Town Sheep sorrounded by Natural Beauties with Forests and High Hills and Rivers.
Satakosia Sanctuary : Satakosia Sanctuary is sorrounding to both side of River Mahanadi.
Name, Address and Phone / Fax / Email of Hotels available in Angul , Orissa
Hotel Prasanti :Turang, Angul Tel:-233051,233052, Fax:- 233554,233451 E-mail:-hppl-pani@sify.com
Hotel Santi: Bus stand, Angul Tel: 230386, 230622, 232932 Fax:-231386, 230158
Hotel Durga: Turang, Angul Tel:-232652,230155, Fax:-232652E-mail:-hoteldurga@sify.com
Hotel Ganapati: Nalco Nagar, Angul Tel:-220061 Fax:-220464
Hotel Razz: PTC Square, Angul Tel:230067,234341 Fax-232070
Central Lodge: Daily market,Angul Tel:-230378
Bikram Lodge: Madanmohan Padhi Lane, Angul Tel:-230200, 232071
Jagannath Lodge: Nalco Chhack, Angul Tel:-220913
Hotel Goutam Vihar: Main road, Angul Tel:-230537,234596 Fax:-230138
Hotel Sandhya: Main Road, Angul Tel:-231357, 220255
Hotel Aurovilla: Circuit House, Angul Tel:-236335,236735 Fax:-236688
Hotel Swagat: Nalco Nagar, Angul Tel.-222913,223498 FAX-222592
Namara Palace: 7th line Amalapada, Angul. Tel.- 233839, 232837 E-mail:hotelnamra @sancharnet.in
Airbat guest House: 6th Line Amalapada, Angul Tel.-230111, 234623 Fax-230779
Hotel Shiv Sagar: Shanti Bazar, Angul Tel.-309511
Kadambini Cottage: Shanti Bazar, Angul.Tel:234371,9437030469(M)
Way side Amenities Centre,: Banharpal At-Narendrapur, Via-Meramundali, Dist. Angul
Posted by sbidyadha
Saturday, August 20, 2011
Tourist Spots of Balasore District, Orissa, Odisha, Visit to see Temples, Sea Beaches, Jungle Beauties and Hill Sations
This is one of the most important district of Orissa which finds place not only in the National map but also in International map for its History ,Geographical situation, Culture, Marine development and for important institutions like Proof and Experimental establishment, Interim Test Range.
Long stretches of green paddy fields, a wide network of rivers, blue hills, beautiful meadows, extraordinary breaches, Religious centers like Remuna ,Chandaneswar, Panchalingeswar, Sajanagarh, Ayodhya ,Maninageswar are collectively denoting Balasore as the “ Granary of Orissa “
Remuna: Remuna is 8 km from Balasore. It is famous for khirachora Gopinath Temple.
Chandipur: Chandipur is a popular sea beach in northen part of Orissa. It is 16 km from Balasore.
Panchalingeswar: Panchalingeswar is the seat of Lingam. It is 40 km from Balasore, a perennial spring flowing over them are the added attraction.
Chandaneswara: 88 km from Balasore is Chandaneswara temple.
Digha: Digha is a beach bordering West Bengal and Orissa.
Talsari: Talsari is a beach near Chandaneswara. It is 6 km from Digha.
Bhushandeswar: 100 Kms from Balasore this Shiva temple is located. Chandaneswar, Talsari, Digha are located with in 30Kms.
Some Other popular places of Baleswar district are also given below:
Tourist Spots of Baragarh District, Visit to see Famous Temple of Nrusinghanath and Kedarnath
Bargarh district has 12 blocks. The district is famous for a 10-day long open-stage drama, Dhanuyatra, stage is life sized taking Bargarh Town, Jira River and Ambapali Village based on the life and times of Lord Krishna, culminating in the death of King Kansa. It is also famous for centuries old handloom industry manufacturing a trade-mark textile form called Sambalpuri.
The people speak Sambalpuri, a dialect of Oriya. There is a 13th century temple at Nrusinghnath where, as the only instance of its kind in the world, Lord Vishnu is worshiped in a feline incarnation.
Nrusinghanath Temple: It is 110 km from Baragarh. This temple was built by Sri Baijal Dev Bikari, the king of Patana during fourteenth century. This temple is famous in all over the Orissa for its Panaromic Position at Gandhamardhan Hill which is Ramayan Fame and for its statues carved on its outside wall.
Kedarnath Temple: This temple is 36km from Baragarh at the foot of famous Bara hill. This temple was built by Sri Dakhsin Ray, the dewan of Ajit Singh, the king of Sambalpur between 1695 to 1765. It is one among the Asta Sambhu temples. Behind this temple there exist the remains of of Kedarnath fort.
Tourist Places of Boudh District , Visit to See Famous Siva Temples , Wild Life in Natural Forests and Natural beauties of River Mahanadi
In East : Nayagarh
In South : Kandhamal
In North : Angul , Subarnapur
In West : Subarnapur, Balangir
Charisambhu: It is famous for Bishnu Temple.
Puruna Cuttack: 40 km from Kandhamal is famous for the tepmle of Goddess Vairabi.
Padmatola: A wildlife sanctuary of Boudh district.
Bagh Irrigation Dam: The Dam Site is a beautiful Picnic Spot of Boudh District. The Place will be about 50 K.M from Baudh
How to Reach Boudh:
Famous Tourist Places of Cuttack District of Odisha , Visit o see Temples, Scenic Spot of Mahanadi, and Island
Cuttack City: Business Capital of Orissa. This city has river Mahanadi in the north and river Kathajodi in the south. Barabati Fort, Temple of Goddess Chandi and Barabati Durga can be visited.
Places of tourist interest in Cuttack :
Stone Patching of Cuttack : The river banks of Cuttack are protected by stone revetment, a great engineering marvel of the 11th century A.D. and a remarkable example of ancient technological skill of Orissa.
Barabati Fort : The ruins of a medieval fort with its moat and gate and the earthen mound of the nine-storeyed palace on the bank of the river Mahanadi are noteworthy. Adjacent to the fort are two modern stadiums.
Temple of Cuttack Chandi : Being the shrine of the presiding deity of the city, the temple of Cuttack Chandi is normally visited by every Hindu visitor.
Quadam-i-Rasool : A sacred shrine both for the Hindus and Muslims, Quadam-i-Rasool, having a compound wall and towers at each corner has inside three mosques with beautiful domes and a Nawabat Khana (music gallery). It is an object of veneration for Hindus and Muslims alike.
Dhabaleswar: 35 kms from Cuttack on the bed of river Mahanadi this Shiva temple is situated.
Ansupa Lake : It is a Running Water Lake adjacent to River Mahanadi near Subarnapur Village of Cuttack District, which is a Natural Bird Sanctuary for many Migrated and Local Birds. This Place is about 68 K.M.s away from Cuttack City and 98 K.M.s away from Bhubaneswar.
Banki: 60kms from Bhubaneswar, Goddess Charchika temple near River Mahanadi.Naraja: Scenic spot on the bank of the Mahanadi with Buddhist images. It is 15 kms from Cuttack.
Bhattarika: 108 kms from Cuttack, famous for the temple of Goddess Bhattarika.
Niali Madhab: 47 kms from Bhubaneswar, Niali is famous for the temple of Sobhaneswar (Shiva) and Madhab (Vishnu).
Simhanath Temple: It is situated in a rocky island in the Mahanadi River at distance of 10 kms from Badamba in Cuttack District. It is also one of the earliest standing temples of Orissa and it shows close affinities both in art and architecture with.
Nemala: 42 km from Cuttack is Samadhi of Acchuttananda.
Famous Tourist Places of Deogarh District, Visit to see Famous Temples, Water Falls, High Hills ,King's Palace and Ist Hydro Electric Project.
Pradhanapat Water Fall: Deogarh District is 97 km to the east of Sambalpur and another 290 km from Bhubaneswar via Talcher. The pradhanapat water fall on the Pradhanpat hill is close by the town is a place of scenic beauty. See Video
Deogarh Town: Beautiful King's Palace and Ist Hydro Electric Project
Famous Tourist Places of Gajapati District, Visit to See Famous Hot Spring , Natural beauties of High Hills and Forests and King's Palace.
Gajapati District:
Krushna Chandra Gajapati Narayan Deo, Maharaja of Paralakhemundi was the direct descendant of the historic Gajapati kings of Orissa ruled for more than seven centuries. During their rule the boundaries of Orissa extended from the Ganga in the North to Udoyagiri in Nellore district in the South. Kolahomee, one of the sons of Kapilendra Deo, the Gajapati king of Orissa came to this part of Paralakhemundi and founded the Raj family of Paralakhemundi in the last half of the 15th Century.
Gajapati district is lying between 180.46’ North & 190.39’ North latitude and 830.48’ East & 840.08’ East longitude. The area is adjacent to boundary of Andhra Pradesh towards South, Ganjam district on the East, Rayagada district on the West and Ganjam and Phulbani districts on the North.
Taptapani: It is situated at a distance of 54 km. from Berhampur and is famous hot sulphur spring surrounded by natural sceneries.
Gandahati Water Fall: A natural water fall in deep forest environment.
Paralakhemundi : King's Palace and Beautiful Town.
Famous Tourist Places of Jagatsinghpur District, Visit to see Famous Port of India and Famous Temple of Goddess Sarala
Jagatsinghpur District is an administrative district of Odisha/Orissa, India. And Jagatsinghpur Town is the district headquarter.
Jagatsinghpur is famous for the Sarala Temple and is termed as the cultural heart of Orissa. The district as a smallest in size among the 30 districts in Orissa has produced some of the most famous names in Oriya and Indian literature like : Kabi Sarala Das, Birakishore, Gopal Chhotaray, and Bibhuti Pattnaik etc.
Again the Paradip, a modern deepwater port, was built in the 1960s, and has now become a hot business point due to the largest foreign direct investment (FDI) in India as POSCO is setting up a plant along with its own port for transportation. Indian Oil Corporation has been trying to set up an oil refinery also.
Bad Luck for Jagatsinghpur was the super cyclone in October 1999 in which more than 10thousands of people died and the worst hit district in orissa coast .
The District is also famous for having the many number of successful theater groups ( Yatra Dala ) which has helped in keeping the old tradition of live acting before thousands of people.The theater groups have become the basic rural entertainment for people all over Orissa and India .
Jagatsinghpur: Jagatsingpur is the district head quarter and situated at a distance of 60 kms from Cuttack and 90 K.M.s from Bhubaneswar the State Capital.
Paradeep Port: 65 km from Jagatsingpur is the largest port of Orissa. One can see the Bay of Bengal with the operation of shipping and transport of goods from the port.
Jhankada: Where the temple of Sarala (Goddess Saraswati) is situated. It is at a distance of 15km from Jagatsinghpur town.
Bay of Bengal in East
Famous Tourist Places of Jajpur District, Visit to see Famous Goddess Sapta Matrukas Temple of Lord Jagannath and important Baudh Pithas
Jajpur District: Odisha
Jajpur is famous for its historic place and pilgrimage which is at a distance of 122 km from Bhubaneswar the state Capital. Once upon a time Jajpur was the capital of Kalinga kingdom and had achieved the glory in archeological excellence. Jajpur is renouned for its natural resources, mines and industries. Situated on the bank of river Baitarani it has blessed with sacred shrine of Goddess Biraja (Durga), Sveta Baraha (incarnation of Lord Vishnu as the white boar), Sapta Matruka and a host of other shrines. It is famous for Saktipitha of Goddess Biraja.
Ashokajhar, Chandikhol, Chhatia, Gokarnika, Kuransa, Mahavinayak, Patharajpur, Ratnagiri, Udaygiri, Satyapira, Singhapur, Vyas Sarobar and Baruneswar Pitha are some of the visiting places of this district.
Jajpur: Jajpur is located at a distance of 92Kms from Cuttack. The sacred shrine of Goddess Biraja, Baraha, Sapta Matruka are situated in here. Jajpur town popularly known as Biraja Khetra, as the place sacred to Goddess Biraja, the symbol of Sakti (Power).It’s a small city surrounded by the river Baitarani by half circle and a high level canal at the other half.
Chhatia: Situated at a distance of 35kms from Cuttack, Chhatia is famous for Lord Jagannath Temple. It is believed and popular floklore as the Lord Jagannath of Puri will be available at Chhatia in Avatar of Kalki during this Kali Yuga.
Chandikhol: Chandikhol, which is at a distance of 40 kms from Cuttack, is an attractive picnic spot with natural springs. And famous for Transporation Point.
Mahabinayak: At a distance of 2 kms from Chandikhol to the west, is situated the Mahabinayak (Shiva temple). The Tourists can enjoy its natural surroundings.
Lalitgiri, Ratnagiri & Udayagiri: The three Boudh Vihars are at a distance of 70kms from Cuttack.The famous Buddhist Complex isbelived as the ancient seat of Puspagiri University, the buddhist university of 7th century A.D. Recently a statue of emperor Ashok is being discovered form Langudi hill.
Duburi : At a distance of 38 km from Chandikhol towards Daitari mines on Express Highway is going to be one of the most famous city in Orissa as a number of Steel plants have been established here. These are Neelachal Ispat Nigam Ltd., Jindal Stainless., Mesco Steels.,VISA and a few others. Also TATA is going to build a huge plant here.
Famous Tourist Places of Jharsuguda District, Visit to See Ancient Caves , Deep Forests and Beautiful Places
Vikramkhol Cave: 88 K.M from Sambalpur, in Jharsuguda District. It is a famous cave which contains pictographic inscription. Jharsuguda Junction Railway Station is 26 km.
Famous Tourist Places of Kalahandi District, Visit to see Temples, Dense Forests, wild life, Water Falls, Orissa, Bhubaneswar, Bhawanipatna, Balangir
Kalahandi District
Kalahandi, placed at the south-western part of Orissa, covers an area of 7920 sq km. the region is divided into plain and hilly terrains. The population of the district is 1335494 as per census 2001 has a population density of 169 persons per sq km. Kalahandi possesses a total cultivable land of 3, 93, 550 hectares out of which 1, 83, 000 hectares of land is utilized for growing paddy. Three big industries contribute considerably to the economic wellbeing of the district. Kalahandi pulls huge number of global tourists through some distint places like Amathaguda, Asurgarh, Ampani, Belkhandi, gudahandi and Mohangiri.
Bhawanipatna: 418 km from Bhubaneswar is the capital of Kalahandi gistrict. It is famous for Goddess Minaskhi and lord Bhawanishankar temples.
Karlapat: 32 kms from Bhabanipatna. The tourists can see the wild animals in the dense forest. The image of Goddess Kanduala attracts the pilgrims.
Khariar: It is famous for the Dhadhibamana temple.
Ampani: 77 kms from Bhabanipatna is Ampani. It is popular for the wild atmosphere, picturesque Ampani hills and a frolicking valley called "Haladigundi". Behera Reservoir is 5 km from Ampani. The whole area abounds in spotted deer, Sambar and Black Panthers.Lanjigarh: Lanjigarh is is 64 K.Ms from Bhawanipatna. The 428 Feet high summit of the Niamgiri hills is situated. The village has some fortifications with a large moat around. It contains the temples of Gopinath and Deity "Dokari".
Phurlijharan: 15 Kilometres from Bhawanipatna, Phurlijharan is a perennial water fall about 30 Ft in height with forest surrounding.
Rabandarh: 12.8 K.Ms from Bhawanipatna is named after a small water fall inside a mountain gorge. The panorama around provides some delightful contrasts of scenery, in mountains and over looking dales, in bore rocks and thick forests. The stream which creates the fall almost dries up during the hot season.
Famous Tourist Places of Kandhamala District of Odisha (Orissa) With Temples, Picnic spots at Water Falls, Deep Forests High Hills and Ghats.
In East : Nayagarh, Ganjam
South : Rayagada
West: Kalahandi
North : Boudh
Chakapada: 60 kms from Phulbani. It is famous for Lord Birupakhya temple.
Putudi: 15 km from Phulbani .It is famous for the picturesque waterfall.
Daringibadi: It is 335 km from Bhubaneswar and is a hill station surrounded by dense forest.
Chari sambhu: This place is famous for Bishnu temple.
Kendrapada district is situated in east coast belt of Orissa, Kendrapara occupies a total area of 2,644 sq km.
Kendrapada District:
Kendrapada Town: Kendrapada is also known as the Tulasi Khetra. This town is famous for the temple of Lord Baladev Jiew.
Kanika Palace: Kanika palace is still has some antiques in it.
Vitarakanika Wildlife Sanctuary: Vitarakanika is 130 Km from Bhubaneswar through Cuttack, Kendrapara, Pattamundai. This wildlife Sanctuary This sanctuary consists of 650 sq km coastal area of Kendrapara, Jagatsingpur and Bhadrak district.
Dangamal: A crocodile project was established at Dangamal where there is a rare variety of crocodiles.Gahiramatha: Gahiramatha is the breeding ground for several endangered species of sea turtles.
Famous Tourist Places of Kendujhar / Keonjhar District of Orissa / Odisha , Visit to see Famous Temples of Lord Siva and Maa Tarini, High Hill water falls, Deep Forests.
Ghatagaon: Ghatagaon in situated on the highway between Jajpur and Keonjhar. It is the Maa Tarini temple located here is the focal point of the place. There is also Ghatakeswar Mahesh Shiva temple build near the Tarini temple. The place is rarely 50 kms from Jajpur on highway. See Video
Khandadhar: Khandadhar is 60 km from Keonjhar town. Water fall of about 500 feet in height, amidst lush green forests is the point of attraction.
Badghagara: 10 km from Keonjhar towards Sambalpur, 200 feet waterfall
Sanghagara: 6 km from Keonjhar towards Sambalpur, 100 feet waterfall View Sanaghagara
Gonasika: 45 km from Keonjhar, Surrounded by a series of valleys and wooded hills, temple of Brahmeswar Mahadev (on the river Vaitarani), this is the place from where the river starts flowing, A little away from the point of origin, the river goes under ground and hence called Guptaganga, only to be seen jumping after a short distance over a stone projection looking like the nostril of a cow, Gonasika hill, Ghatakeswar Mahesh Temple
Gundichaghai Water Fall : A beautiful Picnic Sopt
Sitabinji: 30 kms from Keonjhar (23 Kms. on the Jajpur-Keonjhar Road), Ancient fresco paintings on a rock shelter called Ravan Chhaya which is like a half opened umbrella
Murga Mahadeva: 70 km from Keonjhar, Shiva temple, perennial spring, and water fall.
Koraput District of Odisha
Duduma: 65 kms from Jeypore and 77 kms from Koraput. The magnificent waterfall is regarded as the famous Machhyatirtha.
Bagra: 9 km from Jeypore. Three waterfalls of Kolab river at Bagra starting from Kilkura or the 300 feet plato jump over one another with great speed from a height of 30 feet.
Gupteswar: 65km from Jeypore, cave is famous for the shrine of Lord Gupteswar (Shiva). The natural scenery of this place attracts the pilgrims.
Nandapur: 5kms from Koraput, the great image of Ganapati and throne with 32 steps are the main attractions of this place.
Deomali Peak: Deomali Peak is situated at adistance of 35 km from Koraput with an elevation o 1,672 meter. It is the highest peak in Orissa and the tallest in the whole of the Eastern Ghats. Deomali is dotted with streams and deep valleys, and dence forest.
Koraput Town: Also known as “Sabar Shrikshetra”, the modern Jagannath Temple has come up on a hilltop. The Tribal Museum behind the temple caters to the tourists about the culture and heritage of the tribals.
Gupteswar Temple: Cave shrine of Lord Shiva is situated on a lime stone hill on the bank of river Kolab, surrounded by natural Scenery. Visit Gupteswar
Dumuriput: A village stands between Koraput and Sunabeda road. Sri Ram Temple situated in the locality is widely known for the highest kneeling Hanuman Statue in Orissa.
Kolab Dam: Kolab is at an altitude of about 3000 feet above sea level on river Kolab, stands the Kolab Reservoir generating Power. The place is attracting people for weekend scenery and boating.
Visit to see Old Palace, Water Falls and Water Resorvoirs, Famous Shrine of Gupteswar and High Hills.
Famous Places of Mayurbhanja District of Odisha Orissa to see sanctuary with springs, mountains and Waterfall, Wild Life and Famous Temples
In East West Bengal and Baleswar
In North: West Bengal and Jharkhand
In South : Keunjhar Dist and Jharkhand
In South : Baleswar and Keunjhar Garh
Devkund : A Beautiful and enchanted Picnic Spot in lap of Natural Environment of Water Falls, Deep Forests and High Mountains around. Visit the place and get recharged
Kichakeswari Temple: This temple is situated at Bahalda, 16 km from Baripada. Goddess Kichakeswari is worshipped here.
Tourist and Picnic Places of Nayagarh District in State of Orissa , India to See Famous Temple of Lord Nilamadhava, Raghunath and Lord Ladubaba and beutiful Satakosia Gorge in River Mahanadi.
Nayagarh District
Main Road, Nayagarh,
Ph- 06753253563
Hotel Safari International,
Main Road, Nayagarh.
Ph- (06753)252171
Satkar Lodge,
Main Road,Nayagarh.
Ph- (06753)252266
Asutosh Lodge,
Main Road, Nayagarh.
Ph- (06753)252370
Janata Lodge,
Main Road, Nayagarh.
Hotel Padma,
MainRoad, Nayagarh.
Ph. (06753)252140
Panthika at Sarankul
Famous Spots of Puri Districts of Orissa (Odisha), the Holistic Place which will bring all your Anxieties to Cool yourselves
Puri District
Sri Jagannath Temple : The World Famous Temple of Lord Jagannath , where you will washout all your sins anxieties and wariness to be able to get salvation. The World famous Car Festival of Lord Jagannath ,the festival of Unit, and Devotion will bring you purity in Life. Besides Jagannath Temple Gundicha Mandir, Lokanath Mandir, Sunara Gauranga Mandir , Daria Mahabir Mandir and Tota Gopinath are endless destinations to visit and earn holiness. There are also a number of holy Ponds like Narendra Pokhari, Markandeya Pokhari, Sweta Ganga and Indradyumn and many Monasteries locally known as Mathas also of touristic interest. Puri the Heaven of the Earth and Puri Beach
Astaranga: Astaranga is situated on the sea beach, 60kms from Puri. Kakatpur: 65kms from Bhubaneswar and is famous for Goddess Mangala Temple. This place is between Astaranga and Konark.
Konark : The world famous Sun Temple as the Wonder in field of Architecture and Sculpture is attracting thousands of visitor daily with Attraction of Clam full Sea Shore The World Famous SunTemple at Konark
Sakhigopal SakhiGopinath: The famous Sakhi Gopinath Temple is at Sakhigopal which will be about 12 K.M from Puri and its told without visiting Lord Gopinath after visiting Lord Jagannath is likely fruitless.
Brahmagiri : The Famous Alaranath Temple where, the Lord Jagannath being worshiped during their illness at Sri Jagannath Temple of Puri. Brahmagiri Alaranath
Satapada: The Famous for Entrance to Chilika Lake and View Dolphins attracting hundreds of visitors’ dailly during winter.
Dhauli Giri and Baudha Shanti Stupa : The famous Hill , where the Great King Ashoak was in fight with Kalinga Fighters and lastly changed towards peace and joined Buddhism and became great preacher of the religion. Dhauli Giri the White Pagoda
Famous Places of Sambalpur Districtof Odisha ( Orissa) See Word Famous Dam on River Mahanadi, Ancient Temples, Historical Places, Wild Life Sanctuary
Sambalpur District
Hirakud: 15 km. from Sambalpur. The world's longest multi-purpose Dam is situated here. Gandhi minar and Jawahar minar are constructed on the top of two hills.
Huma: It is situated at a distance of 21 km from Sambalpur. It is famous for Shiva temple and its architectral exalency as its a leaning Temple of Orissa.
Samaleswari Temple: Maa Samaleswari temple is the famous temple of Sambalpur town as well as state. The temples of are like Liakhai, Madanmohan, Satyabadi, Bariha, Brahampura, Dadhibamana, Timini and Gopalji Revals the influence of Vaishnava tradition in Sambalpur.
Ushakothi: 45km from Sambalpur town is Ushakothi wildlife sanctuary. Rock cut paintings can be seen in the Ushakothi cave.
Bells Galore,
Similipal Tiger Reserve Forest and National Park near Baripada in Mayurbhanj District of Orissa India
Lush green forests, grasslands, sparkling cataracts and rivers, tigers, elephants, deer, flying squirrels… there is so much to attract you to visit and stay there at the Similipal Tiger Reserve and national park in Orissa India.
Simplipal is situated at the biotic province Chhotanagpur Plateau in the heart of the former Mayurbhanj State and now in the centre of Mayurbhanj district of Orissa. The Similipal National Park, one of the earliest project to come under Project Tiger, as one of the nine tiger project reserves in the country in 1973. The Government of Orissa declared Similipal Sanctuary with an area of about 2200 sq. km. in 1979 and 303 sq. km. area of the Similipal Sanctuary as National Park in 1980. Again the area of the proposed National Park was increased to 845 sq. km. in 1986. On a result it has spread over an area of 2,742 sq kms
The hills with several peaks and valleys in between, rise steeply from the plains of Udala in the south and Baripada in the south-east and extend up to Jashipur in the north-west, Bisnoi in the north and Thakurmunda to the west. There are several streams flowing in all directions and ultimately draining into the Bay of Bengal via Major permanent rivers are the Budhabalanga, Palpala, East Deo, Nekedanacha (Salandi), West Deo, Khairi, Bhandan and Khadkei.
The riparian zones, perennial streams and meadows form key areas. The Bhadragoda valley, Tarinvilla area, Patbil and numerous small swamps and marshes form the riparian zone. Prominent meadows are Devasthali, Bachhurichara, Sapaghar, Matughar, Tarinivilla, Tiktali, Chahala and upper Barakamuda.
Flora and Fauna: This expansive ecosystem, thanks to the mega conservation efforts, has close to a 100 tigers, Leopard 115, Elephant 449, Spotted Dear 3500, Barking dear 4500, Mouse dear1800, Sambar 9000, Gaur 950, Wild boar10500, Langur 250 troupes, wild bear 2900, Rhesus macaque 75 troupes etc are living freely in side the Project area. And you can also see other mammalian species like antelopes, chitals, chevrotains, wild dog, sloth bears, monkeys, hyenas and porcupines are also found here. There are around 230 species of birds in these forests. The ones officially recorded include the red jungle fowl, hill myna, peafowl, alexandrine parakeet, crested serpent eagle, gray hornbill, Indian pied hornbill, Malabar pied hornbill and Indian trogon. Most of these bird species may be spotted in the park. s Newana area. There is a sizable population of reptiles as well, which include snakes and turtles. The population of crocodiles has increased considerably since the inception of the Mugger Management Program. Simlipal National Park is a floral treasure as well. There are 1076 species of plants belonging to 102 families. of which 92 are orchids having similarities to the Northern and Southern Indian orchids. Seven percent of the Indian species of flowering plants and eight percent of orchids of India are found in Similipal. Northern Tropical Semi evergreen Forests extend over an area of about 80 km. Northern Tropical Moist Deciduous Forests extend over an area of about 1540 sq. km. It is found all over Similipal except the moist valleys on the Southern and Eastern aspects of the hills.
There are 42 species of major mammals, 230 species of Birds and 30 species of reptiles recorded so far in Out of the Indian checklist have 7% reptiles, 20% birds and 11% mammals.
Similipal is rich in orchidaceous flora 92 species of orchids along with the omnipresent sal trees. Innumerable medicinal and aromatic plants are found as well that are a source of earnings for the local tribal population.
Human Population in the Reserve area are largely tribal. Due to low level of skills in modern society, lower educational levels, socio-culture traits, they are mainly dependent on local resources like they collect and sale of minor forest products. Remoteness of the areas and insufficient infrastructure makes it difficult to enforce the existing law for providing total Constraints free zone to Similipal. There are 61 villages in the buffer area and there was nearly forty per cent rises in human population in average.There are four villages inside the core area and the human population in core has increasing slowly.
The beauty of the park brings the person into the state of hypnotic sleep. It is a god gift to this sanctuary. It would take several days to go around the park. The waterfalls, tribal settlements and mountain peaks, increase the glory of the park.
How to Reach: Similipal is open for public to visit from 1st November to 15th June. You can enter Similipal through Pithabata (22 km from Baripada). Entry permits can be obtained from the Range Officer, Pithabata check gate. Day visitors can enter between 6 am to 12 noon and visitors with reservation between 6 am and 2 pm. Similipal is 170 km from Bhubaneshwar, 240 from Kolkata,and 60 km from Balasore. The other entry point Jashipur is 94 km from Baripada on N. H 6, which is connecting Raipur of Chhatisgarh and Kolkata of West Bengal. Both places are well connected by bus. Taxis and jeeps are available.
By Rail: The nearest prominent railhead is Balasore (60 km), served by major trains running under East Coast zone of Indian Railways. By Air: Nearest airports are Bhubaneshwar and Kolkata. Accommodation: Aranyanivas at Lulung has 8 double rooms and 2 dormitories, while Panthasala at Bangiriposi (35 km from Baripada) has 4 double rooms.
Visit Kalijai Temple Shrine of Famous Goddess in Chilika Lake Near Balugan of Khurda District of Orissa,India
KALIJAI TEMPLE:Kalijai temple is situated on an island or you can say a Hill. It is about 18 K.M. away from Balugan in south east direction, the residence of the Goddess Kalijai.Kalijai means Kali + Jai , Kali, the Goddess Kali and Jai a name of a village Girl of Banapur , who was drowned there during her visit to Parikuda Gada for her Marriage. An accidental storm with deep black cloud was drowned her traditional boat there near the hill and vanished. All the Boatmen with her father were alive except that Girl Jai undiscovered!!! Since then many boat men have been listened her low voice during early in the evening there and she became the adorable Goddess of the locality and became respected among Odiya People. Most of the Fisherman Community is worshiping Goddess KaliJai as their “Istha Devi”, Istha means who manages all of Istha (Good) and Anistha (Bad) times. Most of the home tourists know that visit to KaliJai is that’s all to visit Chilika.
Visit Gupteswar famous for Shrine of Lord Shiva nearRamagiri, Koraput, Jeypur of Orissa enriched with natural beauties, High Hill Ranges, Deep Forest