Wednesday, October 13, 2021

भिवगड / भिमगड (Bhivgad/Bhimgad )

 महाराष्ट्रातील "भटक्यांची पंढरी" असा प्रदेश म्हणजे, लोणावळा, कर्जत परिसर. त्यातील कर्जत हा केंद्रबिंदु धरला तर सुप्रसिध्द थंड हवेचे ठिकाण, माथेरान, सह्याद्रीतील कदाचित सर्वात प्राचीन लेणी, कोंढाणे, असंख्य धबधब्यांचे माहेरघर म्हणावे अश्या डोंगररांगा आणि राजमाची, ढाक, कोथळीगड उर्फ पेठचा किल्ला, पदरगड, तुंगी, पेब, सोनगिरी उर्फ पळसदरीचा किल्ला, अपरिचित सोंडाईचा किल्ला अशा असंख्य गडांनी वेढलेले कर्जत गाव भटक्यांचे फेव्हरिट डेस्टिनेशन झाले नसते तर नवलच. कोणत्याही सुट्टीच्या दिवशी किंवा रविवारी तुम्हाला कर्जत स्टेशनवर टिशर्ट, स्पोर्टस पँट किंवा जीन्स घातलेले आणि भल्यामोठ्या सॅक घेतलेले असंख्य ट्रेकर्स दिसतील. याच कर्जतजवळच्या आणखी एका किल्ल्याची आज ओळख करुन घ्यायची आहे, "भीमगड किंवा भिवगड".
कर्जतपासून अंत्यत जवळ, बेताचीच उंची, शेजारीच असलेला "गौरकामत" हा पावसाळी धबधबा आणि दुर्गसंवर्धन झाल्यामुळे एकुणच प्रेक्षणीय गडमाथा, यामुळे अगदी सहकुटुंब भेट द्यावे असा हा किल्ला. पायथ्याच्या गावापर्यंत असलेला उत्तम रस्ता, पायथ्याशी नव्याने झालेली हॉटेल्स यामुळे एन पावसातील एखादा दिवस नक्कीच कारणी लागतो.
Bhivgad 1
इतिहासात घडलेल्या घटनामुळे प्रत्येक किल्ल्याला त्याची एक ओळख मिळाली आहे पण काही किल्ले असे आहेत की त्यांच्यावर काही महत्वाच्या घटना घडल्याच नाहीत आणि घडल्या असल्यास इतिहासाने त्याची नोंद घेतली नाही असे अनेक किल्ले आज विस्मृतीत गेले असुन उपेक्षित आहेत. अशाच अनेक गडापैकी एक गड किल्ले भिवगड. मुंबई- पुण्याहून जवळ असूनही गिरीमित्रांचे पाय येथे वळत नाही. नाही म्हणायला ढाक बहीरीला जाणारे भटके थोडी वाट वाकडी करून या किल्ल्याला धावती भेट देतात. पावसाळ्यात मात्र वदप गावामागे असलेला धबधबा पहायला येणारे काही पर्यटक या गडावर येतात. सतत उपेक्षित राहिलेल्या या गडाची माहिती सहजतेने सापडतही नाही.
         कर्जतजवळचा हा चिमुकला गड किती दिवस बघायचा राहिला होता. अगदी दुसरा एखादा गड पाहून तास-दोन हाताशी असले तरी पटकन पाहून येण्याजोगा किल्ला, पण योग यायचा होता. १५ ऑगस्टला मित्रांबरोबर सुधागड झाला. बाकी सगळेजण परत आपापल्या घरी गेले. मला मात्र अजून एक दिवस जादाची सुट्टी हाताशी होती. तेव्हा परत जाण्यापुर्वी आणखी काही बघणे शक्य होते. कर्जतजवळचे सोंडाईचा किल्ला किंवा सोनगीर उर्फ पळसदरीचा किल्ला असे पर्याय होते. पण पावसात सोंडाई धोकादायक असतो आणि पळसदरीच्या जंगलात बिबट्याचा वावर आहे, त्यामुळे एकट्यादुकट्याने जाणे सुरक्षित नाही, सहाजिकच भिवगड नक्की केला आणि कर्जतला बदलापुर रोडवरच्या एका लॉजवर मस्त ताणून दिली.
Bhivgad 2
( भिवगड परिसराचा नकाशा )

भिवगड उर्फ भिमगड कर्जत जवळील वदप व गौरकामत या दोन गावांच्या मागे छोट्याश्या टेकडीवर उभा आहे. त्यामुळे भिवगडला जायचे तर वदप किंवा गौरकामत गाठावे लागते. अर्थात गौरकामतला जाणारी बस आधी वदपला जाते मग गौरकामत या शेवटच्या थांब्याला पोहचते. दुसर्‍या दिवशी वदपला जाण्यासाठी कर्जत स्टँडवर आलो, तो बस खुप उशीरा होती. सहाजिकच खाजगी गाड्यांना पर्याय नव्हता. कर्जत शहरातूनच उल्हास नदी वहाते. या नदीवरच्या पुलाला "श्रीराम पुल" असे नाव आहे. या पुलाजवळून सहा आसनी रिक्षा कर्जतजवळच्या विविध गावात जातात. कर्जत स्टेशनचा पुल ओलांडून नाष्टा करुन चालत वीस-पंचवीस मिनीटात श्रीराम पुल गाठला. रिक्षा लागलेलीच होती. थोड्यावेळात पुरेशी जनता आत भरल्याचे समाधान झाल्यावर डायव्ह्रर काकांनी स्टार्टर मारला. डुगडुगत रिक्षा धाउ लागली. आजुबाजुचा निसर्ग उधाणलेला होता. काही वर्षापुर्वी ट्रेकनिमीत्ताने याच कर्जतच्या वार्‍या झालेल्या होत्या. त्याच गावाने आता विश्वास बसणार नाही ईतकी कात टाकलेली होती. छोटेखानी कर्जत बरेच विस्तारले होते. पुढे तर अनेक धनदांडग्यांनी, अभिनेत्यांनी, राजकिय नेत्यांनी फार्म हाउसेस घेतल्याने श्रीमंती गाड्यांची वर्दळ जाणवत होती. त्यातच विकेंड कल्चरमुळे छोट्या छोट्या आदिवासी खेड्यातून घरगुती हॉटेल्स त्यात खाणे, पिणे आणि पाण्यात डुंबण्याच्या सोयीपर्यंत सर्व काही दिसत होते. हा बदल चांगला कि वाईट ? हा प्रश्न अनुत्तरीतच राहिला. लांबवर सह्याद्रीची रांग आणि त्यात कळकराय सुळका चिकटलेल्या ढाक बहिरीने दर्शन दिले आणि मी मनाने या जगातून पुन्हा एकदा डोंगरांच्या राज्यात पोहचलो.
Bhivgad 3
( भिवगडाचा नकाशा )
Bhivgad 4
( गौरकामत गावातून दिसणारा भिवगड )
कर्जतपासुन ५ कि.मी.अंतरावर वदप गाव आहे. वदपच्या पुढे १ कि.मीवर गौरकामत गाव आहे. या दोनही गावातुन भिवगडावर अर्ध्या तासात जाता येते. गडावर जायचे तर गौरकामत गावात उतरायचे किंवा वदप असे दोन पर्याय होते.एकंदरीत गडाला दोन वाटा असतील तर शक्यतो एका वाटेने चढायचे आणि दुसर्‍या वाटेने उतरायचे म्हणजे गड पुर्ण पायाळून होतो. सहाजिकच मी गौरकामतला उतरलो.
गौरकामत गावातूनही एक वाट डोंगराच्या सोंडेवरुन भिवगडावर येते व हिच गडावर येणारी मुख्य व सोयीची वाट आहे कारण वदप गावातुन चढल्यास संपुर्ण किल्ला व अवशेष पहायला आपल्याला गौरकामत गावाच्या वाटेला अर्ध्यापेक्षा जास्त किल्ला उतरावा लागतो व गाडी वदप गावात असल्याने परत चढुन यावे लागते किंवा तसेच खाली उतरून किल्ल्याला वळसा मारून परत वदप गावात यावे लागते,त्यामुळे गौरकामत गावातुनच चढाई सोयीची.
Bhivgad 5
( गौरकामतमधील अवशेष )
किल्ल्याची जुनी व मुख्य वाट हीच असुन सर्व अवशेष या वाटेवरच आहेत. गौरकामत गावातून गडावर चढाई करताना सर्वप्रथम कातळात खोदलेल्या पायऱ्या लागतात. त्या किल्ल्याचे प्राचिनत्व सिध्द करतात.
Bhivgad 6
या भागात खुप मोठया प्रमाणात घडीव दगड व गोटे पसरलेले आहेत. येथेच गडाचा मुख्य दरवाजा असण्याची शक्यता आहे.
Bhivgad 7
या ठिकाणाच्या उजव्या बाजुला कड्याच्या वरील अंगास दोन गुंफा कोरलेल्या दिसतात.
Bhivgad 8
या दोनही गुंफांना प्रमाणबद्ध दरवाजे खोदलेले असुन पहिली गुंफा ४०x ३०x १५ आकाराची आहे.
Bhivgad 9
या गुंफेच्या बाहेरील भिंतीवर चौकट खोदलेली असुन गुंफेबाहेर एक मानव व पशु कोरल्याचे शिल्प ठेवलेले आहे.
Bhivgad 10
दुसरी गुंफा या गुंफेच्या वरील बाजुस असुन अर्धवट खोदलेली आहे. पावसाळ्यात हा कडा शेवाळलेला असला तर या गुहांकडे जाण्याचा प्रयत्न करु नये.
Bhivgad 11
येथुन पुढील चाळीस ते पन्नास फुटाचा मार्ग कातळात खोदलेला असुन पायरीमार्ग आहे. या पायऱ्यानी वर आल्यावर काही बांधीव पायऱ्या व गडाची मातीत गाडुन गेलेली तटबंदी नजरेस पडते. या पायऱ्या चढुन आल्यावर आपला गडाच्या माचीत प्रवेश होतो.
चिंचोळ्या आकाराचा हा गड उत्तर-दक्षिण पसरलेला असुन गडाची समुद्र सपाटीपासुन उंची ८५० फुट आहे. गडाची लांबी रुंदी १००० x १५० फुट असुन गडाचे माथ्यावरील एकूण क्षेत्रफळ चार एकर आहे. आधी काहीश्या उपेक्षित असणार्‍या गडाकडे "दुर्गवीर" या संस्थेचे लक्ष गेले आणि बघता बघता गडाचा कायापालट झाला.
भिवगडाच्या डोंगराला त्यांनी खऱ्या अर्थाने गडपण प्राप्त करून दिले आहे. रविवार या सुट्टीच्या दिवशी गडावर मोहिमा करून गडावरील काही टाक्यांची सफाई करून त्यातील गाळ काढण्यात आला आहे. मातीत गाडलेली भिंत माती उकरून बऱ्यापैकी मोकळी करण्यात आली आहे. वदप गावाकडून गडावर जाणारी वाट दुरुस्त करण्यात आली असुन जागोजागी अवशेषांचे ठिकाण दर्शविणारे फलक लावले आहेत. एकदंरीत दुर्गवीर या संस्थेने गडाचे गतवैभव काही अंशी परत आणले. दुर्गवीरच्या या मावळ्यांना मानाचा मुजरा. अश्या संस्थाच्या कार्याला शक्य झाल्यास हातभार तर लावलाच पाहिजे पण शक्य झाल्यास आर्थिक मदत हेच खरे शिवकार्य. उगाच शिवजयंतीला डोक्यावर भगव्या पट्ट्या व फेटे बांधून, डोळ्यावर गॉगल आणि कर्णकर्कश्य हॉर्न वाजवत गावभर फिरणार्‍या तथाकथित शिवभक्तांच्या डोक्यात हे शिरेल तो सुदिन.
Bhivgad 12
( वदप गावातून दिसणारा भीवगड )
गडावर येण्याचा दुसरा पर्याय म्हणजे वदप गावातून गौरकामत गावाकडे जाताना वाटेत गौरमाता मंदीराकडे अशी पाटी दिसते. येथुन उजव्या हाताचा वाडीतून जाणारा रस्ता गौरमाता मंदिराकडे जातो.
Bhivgad 13
( दुर्गवीर संस्थेने अश्या पाट्या लावून चांगली सोय केली आहे )
मंदिराकडे रस्ता संपतो तेथे गाडी ठेवुन इलेक्ट्रीकच्या खांबाच्या बाजूने जाणाऱ्या पायवाटेने भिवगड डावीकडे ठेवत १५ मिनिटे चढल्यावर आपण भिवगडच्या खिंडीत येतो. खिंडीत पोहचल्यावर उजव्या बाजूची वाट ढाकला जाते तर डाव्या बाजूची वाट भिवगडावर जाते. या खिंडीतुन १० मिनिटात गडावर जाता येते.
Bhivgad 14
येथे समोरच कातळात खोदलेले पाण्याचे भुयारी टाके आहे असुन टाके पाण्याने पुर्ण भरल्यावर त्यातुन पाणी बाहेर वाहुन जाण्यासाठी कातळात चर खोदला आहे. गडावर पाण्याची एकुण नउ टाकी असुन त्यातील एक सातवाहनकालीन खोदीव खांबटाके आहे. नउ टाक्यापैकी सहा टाकी ओहरलेली असुन केवळ तीन टाक्यात वर्षभर पाणी असते पण पिण्यायोग्य पाणी फक्त भुयारी टाक्यात आहे. भुयारी टाक्याच्या वरील बाजुने बालेकिल्ल्यात जाणारी वाट आहे तर समोर जाणारी वाट एका खोदीव टाक्याकडे जाऊन संपते. ईतका छोटा माथा आणि कदाचित बेताची शिबंदी या किल्ल्यावर असणार तरी पाण्याची व्यवस्था मात्र चोख केलेली आहे.
Bhivgad 15
बालेकिल्ल्याकडे जाताना वाटेत उजव्या बाजुला उतारावर कोरलेली दोन टाकी दिसतात तर मागील बाजुस जाणारी वाट किल्ल्याच्या सोंडेकडे जाते. या टोकावर काही खळगे असुन डोंगराचा पुढील भाग येथुन किल्ल्यावर प्रवेश करता येऊ नये यासाठी चाळीस ते पन्नास फुट खोल तासुन किल्ल्यापासून वेगळा केलेला आहे. येथुन गडावर येणारी संपुर्ण वाट नजरेत भरते व हि वाट वरून माराच्या टप्प्यात आहे. या वाटेवरून मागे फिरून बालेकिल्ल्याकडे जाताना एक छोटीशी घळ ओलांडुन आपला बालेकिल्ल्यात प्रवेश होतो.
Bhivgad 16
बालेकिल्ल्यावर प्रवेश करण्यापूर्वी एक वाट डावीकडे जाताना दिसते. या वाटेने पुढे गेल्यावर कातळात खोदलेले ५० x ४० फुट लांबीरुंदी असलेले प्राचीन खांबटाके दिसून येते.
Bhivgad 17
या टाक्याला जोडूनच उघडयावर अजुन एक खोदीव टाके आहे.
Bhivgad 18
या टाक्याच्या पुढे काही अंतरावर अजुन एक टाके आहे. हे सर्व पाहुन आल्यावाटेने परत बालेकिल्ल्याकडे निघावे.
Bhivgad 19
बालेकिल्ल्यावर प्रवेश केल्यावर समोरच खडकात खोदलेली दोन पुर्ण व दोन अर्धवट कोरलेली टाकी, खळगे व डौलाने फडकणारा भगवा ध्वज दिसतो.
Bhivgad 20
अर्थात इतके अवशेष असले तरी इतिहासाची पाने चाळली असता या किल्ल्याबाबत काहीही माहिती मिळत नाही.
Bhivgad 21
समोरील बाजुस वाड्याची मातीत अर्धवट गाडलेली भिंत दिसते.
Bhivgad 22
येथुन पुढे गेल्यावर समोरच्या डोंगरावर ढाक बहिरीची चढत जाणारी वाट दिसते. गडाच्या या टोकास मातीत गाडला गेलेला बुरुज व तटबंदी असुन येथे देखील डोंगराचा पुढील भाग तीस ते चाळीस फुट खोल तासुन किल्ल्यापासून वेगळा केलेला आहे. डोंगर तासल्याच्या खुणा येथे स्पष्ट दिसतात. गड राबता असताना येथुन गडावर प्रवेश नव्हता पण आता मात्र या घळीत तटबंदी कोसळुन हि घळ काही प्रमाणात दगडमातीने भरली आहे व येथुनच गडावर यायची वाट तयार झाली आहे.
Bhivgad 23
गडाच्या बालेकिल्ल्यावरील वाडा हा गडाचा सर्वोच्च भाग असुन असुन येथुन सोंडाई,इरशाळगड,प्रबळगड माथेरान डोंगररांगेपर्यंत दूरवरचा प्रदेश दिसतो. उत्तरेच्या बाजुला सह्याद्रीची सोंड खाली उतरली आहे, अन्यथा पेठचा किल्लाही दिसला असता. गडाचे अवशेष खुप मोठया प्रमाणावर मातीखाली गाडले गेले आहेत. गडाची तटबंदी, बुरुज, प्रवेशद्वार अस्तित्वात नसले तरी त्यांचे अस्तित्व जाणवते. संपुर्ण गडफेरी करण्यास एक तास पुरेसा होतो.
रोजच्या धकाधकीच्या आयुष्यात निवांत क्षण तसे दुर्मिळच, त्यामुळे तासाभरात गड पालथा घालून झाला तरी निवांत गवतावर बसून किल्ल्यावरुन दिसणारा नजारा पाहू लागलो.
Bhivgad 24
खाली वदप गाव आणि तिथला तलाव दिसत होता.
Bhivgad 25
तर एका बाजुला गौरकामत गाव आणि तिथला कोलाहल स्पष्ट एकु येत होता. एकदंरीत निवांत आयुष्य कसे असते ते समोर पहात होतो.
Bhivgad 26
गडमाथा गौरीच्या फुलांनी भरलेला होता. यावर्षीच्या गजाननाच्या आगमनाची चाहूल निसर्गाला लागली म्हणायची.
Bhivgad 27
अर्थात मी एकपैस बसलोय हे बहुधा पावसाला पहावले नाही. माथेरानच्या डोंगराकडून पाउस येताना दिसू लागला. अखेरीच गुमान उतरायचा निर्णय घेतला. गडावर गुरे चरायला आली होती. माझ्या चाहुलीने बुजून ती लांब पळाली.
Bhivgad 28
दरीत हा बंगला दिसला. बहुधा पडीक असावा.
Bhivgad 29
तर झाडावर मधमाश्यांनी पोळे केले होते. पावसाळ्यात भरपुर फुलोरा असल्याने त्यांना आता मधाची वर्षभराची बेगमी करता येणार होती.
Bhivgad 30
अखेरीस उतरुन खिंडीत आलो.
Bhivgad 31
इथून समोर उतरणारी वाट वदप गावाकडे तर डावीकडे वर चढणारी वाट ढाक बहिरीकडे जाते. खिंडीतून वाटेने उतरताना एक मोठे आंब्याचे झाड लागते. शेजारच्या टेकडीवर "गौरकामत" हा पावसाळी धबधबा होता. पावसाळ्यापुर्ताच भरात येणार्‍या धबधब्यावर बर्‍याच जणांनचा कोलाहल एकु येत होता. पण मला भिजण्यामधे काहीच रस नव्हता. भीवगडाने दिलेले समाधान घेउन मी कर्जत गाठण्यासाठी वदपची वाट तुडवू लागलो.
पावसाळ्यातील एखादा सवडीचा दिवस पहा आणि सहकुटुंब ट्रेकची हौस भागवणारा, धबधब्याचा भिजायचा आनंद देणारा आणि प्रवासाची आणि एकंदरीत फारशी दगदग नसलेला हा गड नक्की पायाखाली घाला.

 संदर्भग्रंथः-
१) रायगड जिल्हा गॅझेटियर
२ ) सांगाती सह्याद्रीचा- यंग झिंगारो ट्रेकर्स
३ ) डोंगरयात्रा- आनंद पाळंदे
४ ) शोध शिवछत्रपतींच्या दुर्गांचा - सतिश अक्कलकोट
५ ) www.trekshitiz.com हि वेबसाईट

 

पेठचा किल्ला / कोथळीगड (Peth /Kothaligad)

कोकणातील प्राचीन बंदरातून म्हणजे डहाणु, नालासोपारा, चौल, महाड, दाभोळ इथून माल देशावरच्या पैठण, जुन्नर, तेर, करहाटक ( कर्‍हाड) , कोल्हापुर या शहरात व्यापारासाठी नेला जाई. हा माल बैल आणि गाढवावर लादून नेला जात असे. सहाजिकच हि जनावरे जिथे दमतील त्या चालीवर विश्रांतीस्थळे म्हणजेच, लयनस्थळे अर्थात लेणी कोरली गेली. या लेण्यांना आणि व्यापारी तांड्यना सरंक्षणाची गरज निर्माण झाली.
Kothaligad 1
तेव्हा योग्य असे डोंगर पाहून या मरहट्ट देशात दुर्ग उभारणी झाली. असाच एक देश आणि कोकण यांच्या सीमेवरचा गड म्हणजे "कोथळीगड". पेठ गावाच्या सानिध्याने याला "पेठचा किल्ला" असेही नाव आहे. अतिशय प्राचीन कालखंडापासून साक्षिदार असणार्‍या या गडाची आपल्याला आज सहल करायची आहे.
Kothaligad 2
मुंबई-पुण्यापासून अतिशय जवळ असल्याने या गडावर मोठ्या प्रमाणात वर्दळ असते. अलिकडे ट्रेकिंगचे फॅड बोकाळल्याने तर इथे बर्‍याच सुविधा निर्माण झाल्यात. इथे जाणेही तुलनेने सोपे आहे.
१)कर्जतहून एस.टी. ने कशेळेमार्गे आंबिवली या गावात जावे. हे अंतर साधारण ३० किमी आहे. किंवा थेट जामरुख गावी गेले तरी तेथून थेट गडावर जाता येते. कर्जतवरुन जामरुखला जाणार्‍या बसचे वेळा आहेत, सकाळी ८.३०, १०.४५,११.३०, १.००,४.१५, ७.३० आणि परतीच्या वेळा जामरुखवरुन पहाटे ५.३०, ९.००, १०.३०, १२.००, १.२० आणि ४.३०. अर्थातच वेळांची खात्री केलेली चांगली. याशिवाय कर्जत- आंबिवली या मार्गावर खाजगी सहा आसनी रिक्षा धावतात. यांचे भाडे आधी ठरवून घेतलेले चांगले. माझ्या माहितीतील दोन रिक्षांच्या चालकांचे संपर्क क्रमांक देतो जे ट्रेकचे नियोजन करताना उपयोगी पडतील. श्री. गणेश - ७७७३९४९०६८ आणि रोशन - ७०६६९६१४३१
२) नेरळहून येताना कशेळे या गावी यावे आणि जामरुखची एस्‌टी पकडून आंबिवली गावात यावे.
बहुतेक ट्रेकर्स आंबिवली गावातून गडावर जातात. मात्र माझ्या अनुभवाप्रमाणे जांबरुखकडून कमी वेळात गडावर पोहचता येते. जांबरुखवरून आपण २ तासात गडावर पोहचू शकतो तर आंबिवलीतून जवळपास २.५ ते ३ तास लागतात. मात्र आंबिवली गावाच्या हद्दीत एक लेणे आहे ते पहायचे असेल तर आंबिवलीकडून जाणे योग्य होईल. शिवाय आंबिवलीमधे आता दोन-तीन हॉटेल झाली आहेत, इथे आधी सांगितले तर नाष्टा, जेवायची व्यवस्था होउ शकते. यासाठी हॉटेल कोथळीगड ( संपर्क- श्री. गोपाळ सावंत -9028269575, 8446880454 ) यांच्याशी संपर्क साधावा.

   जर आपण कर्जतवरुन कडावमार्गे आंबिवलीला जाणार असू तर वाटेत कडाव गावातील पेशवेकालीन गणपती मंदिर आवर्जून बघावे.

  आंबिवली गाव जसजसे जवळ येईल तसे एखाद्या उपड्या ठेवलेल्या नरसाळ्याच्या आकाराचा कोथळीगड आपल्या नजरेत भरतो.

Kothaligad 3
आधी आंबिवली गावाच्या हद्दीतील लेणे पहाणे सोयीचे कारण किल्ला पहाताना थोडा उशीर झाला तर लेणे पहाणे राहून जाते. प्राचीन काळी कल्याण व ठाणे बंदरातून निघून कुसूर घाटावरच्या पठारावरच्या गावी जोडलेल्या प्राचीन मार्गावर उल्हास नदीच्या उपनदीच्या किनार्‍यावर हे लेणे आहे. ईथे जवळपास पुर्वी लहान वस्ती असावी कारण जवळपास मृदाभांड्याची खापरे सापडतात. हा बहुधा नुसताच विहार आहे. आतमधे षोडशकोनी स्तंभ आहेत आणि त्यावर पाच ठिकाणी प्राकृत भाषेतील शिलालेख आहेत, मात्र ते झिजलेले आहेत. ह्या शिलालेखावरुन हे लेणे बहुधा ३ ते ४ शतकातील असावे. मुळ बौध्द लेण्याचे कालांतराने हिंदु लेण्यात रुपांतर झालेले दिसते. सध्या ईथे राधा-कृष्णाची, पद्मधारी विष्णु-लक्ष्मी, मारुतीची मुर्ती दिसते. सर्व खोल्यांच्या प्रवेशद्वराला लाकडी चौकटीसाठी खोबणी आहेत. सभागृहाच्या मध्यभागी होमकुंडासाठी खड्डा दिसतो. याशिवाय लेण्याच्या बाहेरच्या बाजुला पाण्याची कोरीव टाकी आहेत.

हि लेणी बघून आंबिवली गावात परत यावे.इथेही आपली चहा,नाष्टा तसेच रहाण्याची सोय होउ शकते,आंबिवली गावात श्री. गोपाळ सावंत ( मोबाईल -९०२८२६९५७५,८४४६८८०४५४) यांना संपर्क करता येईल.

Kothaligad 4
लेणी पाहून आंबिवली गावातून जांभुळवाडीकडे जाणार्‍या डांबरी रस्त्याने निघाले कि एक डांबरी सडक डाव्या हाताला वर चढते. कोथळीगड ज्या पठारावर उठावला आहे, त्या पठाराला जोडून एक टेकडी आहे, हिच टेकडी आपण चढत असतो. इथे सध्या कच्चा गाडी रस्ता झाल्याने बाईकसारखे वहान असेल तर थेट वरपर्यंत नेउ शकतो. अर्थात पावसाळ्यात हे टाळलेले बरे. शिवाय रस्ता तसा अरुंद असल्याने कारसारखे वहान बरोबर असल्यास पायथ्याशी आंबिवलीत लाउन पायी वर जाणेच बरे.
Kothaligad 5
थोडे अंतर गेल्यानंतर इथे चक्क एक टोल नाका केला आहे. सुट्टीच्या दिवशी इथे पैसे वसूल केले जातात. हा अधिकार यांना कोणी दिला, याची अधिकृतता काय, याची कल्पना नाही, कारण अगदी अलिकडे म्हणजे १५ ऑगस्ट २०१८ ला मी गेलो होतो तेव्हा ईथे कोणी नव्हते.
Kothaligad 6
वळणावळणाच्या वाटेने आपण एका प्रशस्त पठारावर येउन पोहचतो. इथे पठाराच्या मधोमध सुळक्याचे बोट उभारुन खुणावणारा कोथळीगड नजरेला पडतो.

Kothaligad 41पावसाळा असेल तर इथून कोसळणारे असंख्य धबधबे नजरेला मेजवानी देतात.
Kothaligad 7
इथे क्षणभर विश्रांती घेउन प्रशस्त पण कच्च्या पायवाटेने आपण पुढे निघालो कि नव्याने उभारलेले "भैरवनाथ भोजनालय" दिसते. ( संपर्क - श्री. किरण सावंत -7448286525, 8149440999 आणि श्रीराम सावंत- 9273433840 ) यांच्याकडेही नाष्टा आणि जेवणाची सोय होउ शकते. इथून पुढे निघाल्यावर पेठ गावाच्या आधी एका हॉटेलची छोटी टपरी दिसते,



 याच्या समोर म्हणजे रस्त्याच्या उजव्या बाजुला थोड्या झाडीत एक वीरगळीचा दगड दिसतो. चौकोनी आकाराची हि वीरगळीवर चारही बाजुने कोरीवकाम आहे.कोथळीगड भेटीत हि वीरगळ अवश्य पहा.
या हॉटेलपासून साधारण अर्ध्या तासात आपण पेठ गावात पोहचतो. चंद्रमौळी घरांची डोंगरवस्ती असलेले हे पेठ गाव निसर्गरम्य आहे.
Kothaligad 8
गावातील मारूती मंदिराच्या आवारात तोफ पहाण्यास मिळते. हि तोफ पंचधातुची असावी.
Kothaligad 9
गावाच्या पार्श्वभुमीवर एखाद्या लोडाला टेकून बसलेला सरदार असावा तसा पेठचा किल्ला दिसतो.
वास्तविक सुळका दिसल्यावर आपल्याला कर्नाळा, रतनगड, माहुली आठवतात. इथल्या सुळक्यावर जायचे म्हणजे रॉक क्लायबिंगची तयारी करावी लागते. इथे मात्र आपल्याला अशी कोणतीही तांत्रिक चढाई न करता सुळक्याच्या माथ्यावर जाता येते. हल्ली मोठ्या प्रमाणात येणार्‍या ट्रेकर्समुळे गावकर्‍यांना बराच रोजगार मिळाला आहे.
Kothaligad 10
गावातील काही घरात आपल्या रहाण्या-जेवणाची सोय होते
Kothaligad 11
तर काही जणांनी बैलगाडी राईडची व्यवस्था केली आहे.
या गावाहून वर गडावर चढण्याचा मार्ग दमछाक करणारा आहे. पण वाटेवरील करवंदांची आणि चाफ्याची झाडे ही वाटचाल सुखावह करतात. ही वाट सरळ किल्ल्याच्या प्रवेशव्दाराशी घेऊन जाते.
Kothaligad 12
( कोथळीगड परिसराचा नकाशा )
Kothaligad 13
काहीसा खडा चढ चढून आपण माथ्याच्या जवळ येतो.एन पावसाळ्यात इथे आल्यास खाली ढग आणि आपण गडावर अशी "आज मै उपर, आसमा नीचे" अशी अनुभुती घ्यायला मिळते.
Kothaligad 14
पायवाटेने वर पोहोचल्यावर कातळकोरीव पायर्‍यांचे नजरेला पडतात.
Kothaligad 15
याच्यापुढे चढून गेल्यावर बांधीव प्रवेशव्दाराचे अवशेष दिसतात. याचा अर्थ सुळक्याभोवती पुर्ण तटबंदी बांधून दुर्गनिर्मिती केली असावी.
Kothaligad 16
हा गड पुरातत्वखात्याच्या ताब्यात आहे. अर्थात धमकी देणारा सरकारी खाक्याचा मजकूर सोडला तर पुरातत्व खात्याने इथे नेमके कोणते काम केले आहे याची काही कल्पना नाही. त्या फलकाची अवस्था बघता पुरातत्व खात्याची देखरेख दिसून येतेच.
Kothaligad 17
इथून आपण शेवटचा चढ चढून कातळकोरीव गुहेपाशी येतो. सर्वप्रथम दिसते ती देवीची गुहा, पाण्याचं टाके गुहेत ४५ ठिकाणी गोल खळगे आहेत आणि काही जूने तोफेचे गोळे आहेत. हि गुहा मुक्कामासाठी उत्तम आहे.
Kothaligad 18
गुहेच्या अलिकडे एक पाण्याचे टाके आहे. मात्र इथले पाणी आता गढुळ वाटले.
Kothaligad 19
गुहेमधे हि बहुधा भैरोबाची मुर्ती दिसते.
Kothaligad 20
त्यानंतर जानाई देवीची आणि भैरवाची मुर्ती दिसते.
Kothaligad 21
आणि मग डावीकडे ऐसपैस अशी भैरोबाची गुहा.
Kothaligad 22
या गुहेचे वैशिष्ट्य म्हणजे सपाट, समतल भूमी आणि छताला आधार देणारे कोरीव नक्षीदार खांब.
Kothaligad 23
हि मुर्ती नेमकी कोणाची आहे ते समजत नाही, पण दर्पणसुंदरी असावी का?
Kothaligad 24
गुहेतील खांबावर बरेच शिल्पपट कोरलेले दिसतात.
Kothaligad 25
हि मुख्य गुहा पाहून आधी सुळक्याच्या आसपास फेरफटका मारुया.
Kothaligad 26
सुळक्याच्या दक्षीण पायथ्याशी एक पाण्याचे टाके कोरले आहे, आता मात्र ते कोरडे असते.
Kothaligad 27
इथून थोडे पुढे आले कि तटबंदीतील अवशिष्ट बुरुज दिसतो.
Kothaligad 28
याच्यापुढे थोडी सपाटी आहे. इथेच गडावर सापडलेल्या दोन तोफा ठेवलेली आहे.
Kothaligad 29

एकेकाळी माचीच्या सपाटीवर या तोफा दुर्लक्षित अवस्थेत पडलेल्या असल्या तरी यांना व्यवस्थित गाड्यावर बसवून जणू जुन्या दिमाखात पुन्हा स्थापन केले आहे.

कर्जतच्या सह्याद्री प्रतिष्ठाणने कोथळीगडाच्या दुर्गसंवर्धनाचे स्त्युत कार्य हाती घेतले आहे.
याशिवाय इच्छा आणि वेळ असल्यास गडाच्या सुळक्याभोवती प्रदक्षिणा घालता येते. प्रदक्षिणा घातलताना वाटेत उत्तर टोकाशी पाण्याच्या टाक्यांचे दोन समुह व एक लेण पाहायला मिळते.
Kothaligad 30
पायथ्याचे सर्व अवशेष पाहून झाल्यानंतर आपण गडाच्या सुळक्याच्या माथ्यावर जाउया. यासाठी पुन्हा गुहेजवळ येउन एका ऊर्ध्वमुखी भुयारात प्रवेश करावा लागतो.या कोरलेल्या सुळक्यामुळेच गडाला कोथळीगड नाव पडले असावे, कोथळा म्हणजे कोरुन काढणे, म्हणून सुळका कोथळला तो "कोथळीगड".
याच कोथळीगड नावाची आणखी एक कथा सांगितली जाते. फार पुर्वी या डोंगराळ मुलुखात अभीर जातीचे कातकरी लोक रहात, त्यांना "कोथडी" नावाने संबोधले जाई. सोपी टाक, म्हणजे सोपवून टाक, उडवी टाक म्हणजे उडवून टाक अशी भाषा बोलणार्‍या कोथडी ( याचाच अपभ्रंश पुढे कातोडी झाला असावा का? ) लोकांची पेठ गावात मोठी वस्ती होती. शत्रुंपासून स्वताचे संरक्षण करण्यासाठी जवळच असलेल्या आणि घनदाट जंगलाने वेढलेल्या डोंगरावर एक किल्ला बांधला होता आणि त्याला नाव दिले , "कोथडीगड". पुढे कोथडी नावाचा अपभ्रंश होउन कोथळा किंवा कोथळी असे नाव रुढ झाले. त्यावरुन या डोंगराला 'कोथळा' किंवा कोथळीगड असे नाव पडले जे आजही रुढ आहे. अर्थात हि फक्त दंतकथा आहे आणि त्यात तथ्य नसावे.
Kothaligad 31
वर जाताना उजव्या हाताला हि नक्षीदार चौकट दिसते. इथे एक खोली असावी, मात्र इथे जाणे थोडे अवघड आहे. तर इथेच डाव्या हाताला दगडात कोरलेले दालन दिसते.
Kothaligad 32
सुळक्यावर जाण्यासाठी सुरवातीला व्यवस्थित पायर्‍या कोरलेल्या आहेत.
Kothaligad 33
मात्र एक टप्पा थोडा अवघड आहे.
Kothaligad 34
हा टप्पा पार केला कि आपण कातळकोरीव पायर्‍यांच्या मार्गातून गडमाथ्याकडे पोहचतो.
Kothaligad 35
पायर्‍यांच्या शेवटी दगडात कोरून काढलेला दरवाजा आहे.दरवाज्याची हि आधीची अवस्था बिकट असली तरी आता मात्र या दरवाज्याला पुन्हा जुने रुप मिळाले आहे.
Kothaligad 36
पायर्‍यांच्या मार्गावर उजवीकडे गज शिल्प कोरलेले आहे. शेजारीच शरभ शिल्प आहे.

अलिकडे अनेक गडांवर दुर्गसंवर्धनाची काम सुरु आहेत्,त्यात या गडाचे भाग्य उजळले आणि इथे नष्ट झालेल्या दरवाज्याच्या जागी नवीन दरवजा बसविलेला आहे.अर्थात या सुळक्यावर हत्ती येण्याची अजिबात शक्यता नाही,तेव्हा मुळ दरवाज्याला खिळे नसावेत.तरीही कदाचित हौस म्हणून असे खिळे या दरवाज्यावर बसविलेले दिसतात.
Kothaligad 37
गडमाथ्यावर पाण्याची दोन टाकी आहेत. पाणी अर्थातच पिण्यास अयोग्य आहे. याशिवाय जवळच पहारेकर्‍यांच्या निवासस्थानाच्या घराचे अवशेष दिसतात.
Kothaligad 38
आम्ही एन १५ ऑगस्टला गेल्याने एका सुळक्यावर ध्वजवंदनाचा क्षण अनुभवला.
Kothaligad 39
गडमाथा समुद्रसपाटीपासून १५५० फुट उंचावर आहे. किल्ल्याच्या कुशीत वसलेली पेठवाडीची ईटुकली घरे लोभस दिसतात.
Kothaligad 40
इथे उभारले कि विस्तृत प्रदेश नजरेत भरतो. पुर्वेला पुर्ण सह्याद्रीचा काळा बॅकड्रॉप दिसतो. गडमाथ्यावरुन उत्तरेला भीमाशंकरकडील कलावंतिणीचा महाल, नागफणी, वाघाचा डोळा, सिद्धगड, कल्याणकडील हाजीमलंग, तर पश्चिम दिशेला चंदेरी, प्रबळगड, इर्शाळगड, माणिकगड, माथेरानचे पठार हा विस्तृत मुलूख नजरेच्या टप्प्यात येतो. या परिसरात वहाणार्‍या भर्राट वार्‍याचा विचार करुन इथल्या परिसरात मोठ्या प्रमाणात पवनचक्क्यांची उभारणी झाली आहे.
परिसरातील लेणी, गडाच्या पोटातील लेणे, कातळकोरीव पायर्‍या आणि दरवाजा आणि शरभ शिल्प या सगळ्याचा विचार केला तर हा गड प्राचीन आहे हे नक्की , पण आज तरी याचा ईतिहास अज्ञात आहे.
लहानशा दिसणार्‍या या किल्ल्याचा इतिहास मोठा रक्तरंजित आहे. त्याविषयाची माहिती मराठी व इंग्रजी कागदपत्रातून नव्हे तर मुघली कागदपत्रांमधून मिळते. हा किल्ला काही बलाढ्य दुर्ग नाही, पण एक संरक्षक ठाणं होता. मराठ्यांचे या किल्ल्यावर शस्त्रागार होते. संभाजीमहाराजांच्या काळात त्याला विशेष महत्त्वही प्राप्त झाले होते.
शिवाजी महाराजांनी १६५७ मधे हा गड ताब्यात घेतला. विशेष म्हणजे कृष्णाजी अनंत लिखीत सभासद बखरीतील 'नवे गड राजियांनी वसवले, त्यांची नावानिशीवार सुमारी सुमार १११, या दुर्गनामांच्या यादीत 'कोथळागड' हे एक नाव असून यावरून शिवकाळात तरी हा गड 'कोथळागड' म्हणूनच प्रसिध्द होता हे समजते. अर्थात हा गड शिवाजी महाराजांनी नक्कीच वसवला नसावा, फक्त त्याची डागडूजी केली असावी.
पुढे औरंगजेबाच्या स्वारीपर्यंत तो स्वराज्यात होता. औरंगजेबाने नोव्हेंबर १६८४ मध्ये अब्दुल कादर व अलईबिरादरकानी यांना संभाजींच्या ताब्यातील किल्ले घेण्यासाठी पाठवले. ’कोथळागड’ हा महत्त्वाचा असून जो कोणी तो ताब्यात घेईल, त्याचा ताबा तळकोकणावर राहील हे लक्षात घेऊन अब्दुल कादर याने हा किल्ला घेण्यासाठी प्रयत्न सुरू केले. तो या किल्ल्याच्या जवळपास गेला आणि तेथे राहणार्‍या लोकांना त्याने आपले नोकर म्हणून ठेवून घेतले. मराठे या किल्ल्यातून शस्त्रांची नेआण करतात, हे कळताच अब्दुल कादर व त्याचे ३०० बंदूकधारी नोव्हेंबर १६८४ मध्येच गडाच्या पायथ्याशी पोहोचले. मराठ्यांनी त्यांना मागे हटवले, पण तरीही काही लोक किल्ल्याच्या मगरकोट दरवाज्याजवळ पोहोचले आणि त्यांनी ‘दरवाजा उघडा‘ अशी आरडाओरड सुरू केली. किल्ल्यावरील मराठा सैन्याला वाटले की आपलेच लोक हत्यारे नेण्यासाठी आले आहेत, म्हणून त्यांनी दरवाजा उघडला. दरवाजा उघडताच मोगल सैनिक आत शिरले मराठे व मोगल यांच्यात लढाई झाली. अब्दुल कादरच्या मदतीसाठी माणकोजी पांढरेही आले, झालेल्या लढाईत मोगलांना यश आले.
दुसर्‍याच दिवशी मराठ्यांनी किल्ल्याला वेढा घातला, फार मोठी लढाई झाली. या लढाईत बाणांचा व बंदुकींचा मोठ्या प्रमाणात वापर करण्यात आला.या लढाईत किल्ल्यावरचा दारूगोळा आगीच्या भक्ष्यस्थानी पडला. गडावर जाणारी सामुग्री मराठ्यांनी लुटल्यामुळे मुघल सैन्याला दारूगोळा व धान्य मिळेनासे झाले. दरम्यानच्या काळात अब्दुल कादरच्या मदतीला कोणीच न आल्यामुळे त्याची परिस्थिती कठीण झाली. वेढा टाकल्यानंतर दहा बारा दिवसांनी जुन्नरचा किल्लेदार अब्दुल अजिजखान याने आपला मुलगा अब्दुलखान याला सैन्यासह अब्दुल कादरच्या मदतीला पाठवले. अब्दुलखान तेथे पोहचला तेव्हा त्याची वाट अडवण्यासाठी मराठ्यांचा सरदार नारोजी त्रिंबक र्यांनी तेथील खोरे रोखून धरले होते. येथेही लढाई झाली नारोजी त्रिंबक व इतर सरदार धारातीर्थी पडले आणि कोथळागड मुघलांच्या ताब्यात गेला. इहमतखानाने नारोजी त्रिंबकाचे डोके रस्त्यावर टांगले किल्ला जिंकून सोन्याची किल्ली औरंगजेबाकडे पाठवण्यात आली. औरंगजेबाने कोथळागड नावाचा असा कोणता गड अस्तित्वात आहे का? याची खात्री करून मगच अब्दुलखानाला बक्षिसे दिली. मुघलांनी गडाला ‘मिफ्ताहुलफतह‘ (विजयाची किल्ली) असे नाव दिले. फंदफितुरीमुळे मराठ्यांच्या हातून हा मोक्याचा किल्ला निसटला.
गड परत मिळवण्यासाठी मराठ्यांनी प्रयत्न सुरू केले. डिसेंबर १६८४ मध्ये गडाकडे जाणार्‍या मुघल सैन्याला मराठ्यांनी अडवले. नंतर मऱ्हामतखानालाही ७००० मराठ्यांच्या तुकडीने अडवले. पण मराठ्यांना यश लाभले नाही. त्यानंतर एप्रिल १६८५ मध्ये ७०० जणांच्या तुकडीने पुन्हा हल्ला केला. २०० जण दोरीच्या शिडीच्या मदतीने किल्ल्यात उतरले. बरेच रक्त सांडले, पण मराठ्यांची फत्ते होऊ शकली नाही. मराठ्यांनी हा महत्त्वाचा किल्ला गमावला होता. सन १७१३ मधे शाहु- कान्होजी आंग्रे यांच्यामधील तहानुसार कोथळीगडाची मालकी कान्होजी आंग्रे यांना मिळाली. पुढे १८१७ च्या नोव्हेंबरमध्ये दुसर्‍या बाजीराव पेशव्याच्या वतीने बापुराव नामक शूर सरदाराने हा किल्ला इंग्रजांच्या ताब्यातून सोडवला. पण ३० डिसेंबर १८१७ ला कॅप्टन ब्रुकने फारसा प्रतिकार न झाल्याने हा गड पुन्हा ईंग्रजांच्या अधिपत्याखाली आणला. सुमारे १८६२ पर्यंत किल्ल्यावर माणसांचा राबता होता.

 संदर्भग्रंथः-
१) रायगड जिल्हा गॅझेटियर
२ ) सांगाती सह्याद्रीचा- यंग झिंगारो ट्रेकर्स
३ ) साथ सह्याद्रीची ! भटकंती किल्ल्यांची !!- प्र.के. घाणेकर
४ ) डोंगरयात्रा- आनंद पाळंदे
६ ) शोध शिवछत्रपतींच्या दुर्गांचा - सतिश अक्कलकोट
७ ) दुर्गकथा - महेश तेंडूलकर
८ ) www.trekshitiz.com हि वेबसाईट

मनसर

 प्रकार : गिरीदुर्ग जिल्हा : नागपुर उंची : १२०० फुट ...