ओढा गावातील मंदीरे :-
तातोबा मंदिर :
नाशिकहुन निफाडकडे जाताना साधारण १४ किलोमीटर अंतरावर ओढा हे एतिहासिक गाव आहे. गोदावरीच्या कुशीत पहुडलेलं ओढा तसं लहानसं गाव. गावातील गोदावरीच्या काठावरील गणेश घाट आणि श्री सिद्धिविनायक मंदिरासाठी गाव प्रसिद्ध आहे. नाशिकच्या पंचवटीमधील प्रसिद्ध काळाराम मंदिराचा जीर्णोद्धार करणारे रंगराव ओढेकर ! याच गावातील. गावातील आजमितीला जमीनदोस्त झालेल्या ओढेकरांच्या वाड्याच्या मागील बाजूस असलेले तातोबा मंदिर आज विस्मृतीत गेले आहे. एक ऐतिहासिक वास्तू आज अखेरच्या घटका मोजत आहे.,मंदिराची पडझड होत असून काटेरी झुडुपांनी मंदिराला वेढा घातला आहे. पुरातत्व विभागाच्या राज्य संरक्षित स्मारकात समावेश असूनही ही वास्तू पूर्णपणे दुर्लक्षित राहिली आहे.















ओढ्याचा शमी गणेश :-
ओढा या ठिकाणी गणेशाची स्वयंभू मूर्ती आहे. त्याला ओढ्याचा 'शमी गणेश' असे म्हणतात. गोदावरीच्या काठी असलेले हे मंदिर अत्यंत विलोभनीय आहे. या मंदिराचे वैशिष्ट्य म्हणजे सूर्याची पहिली किरणे गणपतीच्या पायावर पडतात व तिथून परावर्तित होऊन समोर असलेल्या महादेवाच्या मंदिरात जातात. याचे साक्षीदार होण्यासाठी हजारो भाविक पहाटे दर्शनाला हजेरी लावतात. ओढा हे गाव तसे ऐतिहासिक. ब्रिटीशांच्या कालावधीत पेशव्यांचे राज्य असताना रंगराव ओढेकर नावाचे ब्राह्मण या ठिकाणी वास्तव्यास होते. त्यांनीच नाशिकच्या काळाराम मंदिराची उभारणी केली. ते धार्मिक वृत्तीचे असल्याने व त्यांना नित्य गणपतीची पूजा करण्याची सवय असल्याने त्यांनी ओढा येथे गणेशाच्या मंदिराची स्थापना केली. ओढेकर सरदारांची ओढा येथे मोठी गढी होती. आजही या गढीचे भग्नावशेष पाहायला मिळतात.हे मंदिर म्हणजे वास्तुशास्त्राचा अविष्कार आहे. मंदिरात कमानीतून प्रवेश करतांना समोरच रूद्रहनुमान मंदिर व नीळकंठेश्वर महादेवाची मंदिरे दृष्टीस पडतात. दगडाच्या पायऱ्या उतरून खाली घाटाकडे गेल्यास उजव्या बाजूला नजरेस पडते ते स्वयंभू गणेश मंदिर. गणेशाची उजव्या सोंडेची मूर्ती चार भुजांची आहे. तिच्या एका हातात अंकुश असून दुसऱ्या हातात पाश आहे. दोन्ही हातांनी तो श्रद्धा आणि भक्ती मागतो. उदराला नाग आहे. गणपती मूर्ती चौरंगावर स्थापन्न झालेली असून पूर्वाभिमुख आहे. तसेच हातात कडे, पायात कडे तर डोक्यावर मुकूट आहे. काही वर्षांपूर्वी गावातल्या सहकाऱ्यांनी एकत्र येऊन मंदिराचा जीर्णोद्धार केला. या जीर्णोद्धारात मूळ मंदिराला धक्का न लावता समोरील मोठे दगड दूर करून सभामंडपाची उभारणी केली. या मंदिराचे बांधकाम एकाच शिळेतील असल्याने मंदिराला प्रदक्षिणा घालता येत नाही. विस्तिर्ण अशा सभामंडपामुळे भाविकांना प्रसन्नता लाभते.

या मंदिराच्या परिसरात शमी वृक्ष मोठ्या प्रमाणात होते. त्या झाडांच्या सावलीत गणपतीचे मंदिर होते. त्यामुळे या गणपतीला 'शमी गणेश' म्हणूनही संबोधले जाते. त्याचप्रमाणे उजव्या सोंडेची मूर्ती असल्याने तिला काही भाविक 'सिद्धिविनायक' देखील म्हणतात. दर चतुर्थीला येथे दर्शनासाठी भाविकांच्या रांगा लागलेल्या असतात. त्याचप्रमाणे अंगारकी चतुर्थीला येथे यात्रा भरते. दरवर्षी गणेश याग केला जातो. तसेच गोकुळाष्टमीला हरिनाम सप्ताह आयोजित केला जातो.
चांदोरी गाव :-
चांदोरी हे गाव नाशिकपासून नाशिक-औरंगाबाद रस्त्यावर पंचवीस किलोमीटरवर आहे. चांदोरी चिरेबंदी वाड्यांसाठी ओळखले जाते. ऐतीहासिक आणि पौराणिक वारसा लाभलेल्या "नाशिक" जिल्ह्यातील "निफाड" तालुल्यात "चांदोरी" गाव स्थित आहे,चांदोरी गाव हे प्राचीन मंदिरे व वाड्यांसाठी प्रसिद्ध आहे, गावाच्या दक्षिणेला गोदावरीचा प्रवाह वाहत जातो, त्या ठिकाणी तिला चंद्राकार वळण प्राप्त झाले आहे, म्हणून या ठिकाणी तिला "चंद्रावती" म्हटले जाते, याचं शब्दाचं पुढे "चांदोरी" शब्दात रूपांतर झाले, तसेच, ते महाराष्ट्रात फक्त चांदोरी (व त्र्यंबकेश्वबर) येथेच इंद्राच्या एकमेव मंदिरासारख्या वैशिष्ट्यपूर्ण मंदिरांसाठीही ओळखले जाते. मठकरी वाड्यातील राममंदिराजवळ १८५२ मध्ये बांधलेले दत्तमंदिर आहे. वाड्यामागील उजव्या सोंडेच्या गणेशाचे मंदिरही जागरूत समजले जाते. सरदार हिंगणे यांच्या वाड्यातील देवी ही कोल्हापूरच्या देवीचे अधिष्ठान मानले जाते.गोदेच्या कुशीत बुडालेली मंदिरे हे चांदोरीचे वैशिष्ट्य आहे. पाण्यात राहूनही ती हेमाडपंती मंदिरे सुस्थितीत आहेत. चांदोरी गावाला,रामकुंड घाटाप्रमाणेच भव्य घाट निर्माण केलेला आहे,येथिल काही मंदिरे सुमारे ७ व्या ते ८ व्या शतकातील आहेत, काहींचा निर्माण काळ,अचूक सांगता येतं नाही,इतिहासकारांच्या मते इथली काही मंदिरे शिवकालीन तर,काही यादवकालीन आहेत,असा अंदाज आहेत,या नदीपात्रात १२ हेमाडपंती शिवमंदिरे होती, एकाच रांगेत ठिकठिकाणी त्यांची निर्मिती केली होती, शंकराची ती बारा मंदिरे आहेत. त्यामुळे या मंदिरांना १२ ज्योतिर्लिंगांची प्रतिकृती मानले जातं असे,यातली काही आज पूर्णपणे उध्वस्त झालेली आहेत, तर काही टिकून आहेत,तसेच नदीपात्रात इतरत्र लहान-मोठे शिवलिंग, नंदीदेव, गणपती, शनिदेव, शेष-नारायण,नागशिल्प,नरसिंह,इंद्र,आदी देव-देवतांच्या मुर्त्या, प्रतिमा आजही सापडतात, पंचमुखी महादेवाचे दुर्मीळ मंदिर हेही विशेष होय. ती मंदिरे अहिल्याबाई होळकर यांनी बांधल्याचे म्हटले जाते.
चांदोरीमध्ये राम मंदिराच्या आवारात एक प्राचीन शिवमंदिर आहे. इंद्र देवाने अहिल्येची छेडखानी केली असता त्यास गौतम ऋषींनी शाप दिला होता की तुला १००० भगे(भोके)पडतील. परंतु, इंद्र देवाने गौतम ॠषींकडे उपःशाप मागितला असता इंद्र देवास सोमेश्वराची प्रार्थना कर, असे सांगितले. इंद्र देवाने ज्या ठिकाणी सोमेश्वराची प्रार्थना केली ते हेच शिवमंदिर. पुढे रावणाचा मामा मारीच सुवर्णमृगाचे रुप घेवुन पंचवटीतून रामाला चांदोरीपर्यंत घेवुन आला. परंतु, रामाला जेव्हा हा मायावी राक्षस आहे हे कळले तेव्हा त्यास शिवमंदिरपासून हरणावर बाण मारला. तो बाण चाटोरी या गावा जवळ चाटून गेला म्हणून या गावास चाटोरी हे नाव पडले. तो राक्षस नांदुर मध्यमेश्वरजवळ मरण पावला. हे मंदिर काळाच्या ओघात नेस्तनाबूत झाले. राम मंदिर बांधल्यावर पुजार्यांना स्वप्न पडले. रामाच्या पाठीमागे आहे, तरी मला वरती काढावे. त्यावेळेस शिवलिंग मिळाले. श्रावणातील तिसर्या सोमवारी येथे सोमेश्वराचा मुखवटा ठेवला जातो.
मंदिराच्या मागे दोन भव्य घाट बांधलेले आहेत, अनेकदा पूर येऊनही ते जसेच्या तसे आहेत,सन १९०८ पासून दुष्काळ पडण्याच्या आणि ही मंदिरे उघडे पडण्याच्या घटनाही सातत्याने घडतं आहेत, सन १९७०-७१-८२- ८५, २०१६ आणि २०१९ च्या दुष्काळात ही मंदिरे पूर्णपणे उघडी पडली होती, त्यावेळी अनेकांनी या मंदिरांचे दर्शन घेतले होते . नदिपात्रात अनेक मूर्ती बेवारसरीत्या पडलेल्या पाहण्यास मिळतात. त्या मूर्तींचे संकलन करून गावात वस्तुसंग्रहालय उभारल्यास तो ऐतिहासिक वारसा जपला जाऊ शकतो.
जेजुरीच्या खंडेरायाच्या दर्शनाला जाण्यापूर्वी आणि जाऊन आल्यानंतर प्रथम चांदोरी येथे दर्शन घेण्याची परंपरा आहे. त्यामुळेच “आधी चांदोरी, मग जेजुरी” ही श्रद्धापर परंपरा चांदोरीसह पंचक्रोशीत अनेक वर्षांपासून अव्याहत सुरू आहे.
चांदोरी गावचे जहागीरदार सरदार भाऊसाहेब हिंगणे यांचे सातवे वंशज पुष्कर हिंगणे यांनी दिलेल्या माहितीनुसार, हे मंदिर सुमारे २५० ते ३०० वर्षांपूर्वी उभारण्यात आले. त्यांच्या पणजोबा नानासाहेब हिंगणे यांनी या मंदिराची स्थापना केली. मंदिरात स्वयंभू पिंड असून, बाहेर हेगडी प्रधानाची मूर्ती आणि आवारात दीपमाळ आहे.
वर्षभर येथे विविध धार्मिक उत्सव मोठ्या श्रद्धेने साजरे केले जातात. माघ पौर्णिमेला दोन दिवसांची यात्रा भरते आणि या दिवशी बारा गाड्या ओढण्याची परंपरा आहे. दिवंगत भक्त चंद्रकांत गडाख यांनी येथून पायी जेजुरी वारीची परंपरा सुरू केली. गडाख कुटुंबाकडे बारा गाड्या ओढण्याचा मान असून, मंदिरातील पूजाविधीची जबाबदारी गुरव कुटुंबाकडे आहे. दिंडोरी, निफाड आणि आजूबाजूच्या गावांतील भक्त जेजुरीला जाताना चांदोरी येथे काठीची भेट आणि दर्शन घेतात. ही परंपरा आजही श्रद्धेने पाळली जाते.
देव खंडोबा बानूच्या माहेर असलेल्या चंदनपुरीला जाताना चांदोरी येथे गोदावरीच्या तिरी मुक्कामी थांबले. गावचे जहागीरदार हिंगणे यांना स्वप्नात दृष्टांत देऊन, “माझ्या मुक्कामाच्या ठिकाणी मंदिर बांधा,” असे सांगितले. चमत्कार असा की ज्या ठिकाणी मंदिर उभारण्यात आले, तेथे जेजुरीप्रमाणेच स्वयंभू पिंड प्रकट झाली. या स्थानी खंडोबाचा पदस्पर्श लाभल्याची श्रद्धा असल्यामुळे या मंदिराला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे.
॥ चंपाषष्ठी दिवसी अवतार धरिसी, मणी-मल्ल दैत्यांचा संहार करिसी ॥
॥ चंपाषष्ठी करिती जे कुळधर्म, त्यांचे होत आहे परिपूर्ण धर्म ॥
चंपाषष्ठीच्या दिवशी चांदोरीतील ग्रामस्थ आपल्या घरातील देव्हाऱ्यातील देव भेटीसाठी येथे आणतात. पहाटेपासून सायंकाळपर्यंत भाविकांची मोठी वर्दळ असते. मंदिराचा जीर्णोद्धार १९८० च्या सुमारास करण्यात आला असून, खंडेरावाच्या भंडाऱ्याचा म्हणजेच पिवळा रंग मंदिराला देण्यात आला.
चित्राच्या एका बाजूला भक्त प्रल्हाद अतिशय शांत आणि नम्र मुद्रेत उभा असून त्याचे हा भाव नृसिंहाच्या रौद्र रूपाच्या अगदी विरुद्ध आहे, त्याच्या शेजारी त्याची माता कयाधू उभी असून भगवंताने आपल्या मुलाचे प्राण वाचवल्याचे आणि देवप्रती असलेली तिची कृतघ्नता तिच्या चेहऱ्यावर अगदी स्पष्टपणे चित्रित केले आहे.
मराठा चित्रशैलीच्या वैशिष्ट्यांनुसार, कयाधूला पारंपरिक नऊवारी साडी, नाकात नथ आणि कपाळावर मोठे कुंकू अशा अस्सल महाराष्ट्रीयन वेशभूषेत दाखवण्यात आले आहे. गेरूच्या लालसर-तपकिरी रंगाचा वापर आणि चेहऱ्यावरील ठळक रेषा यांतून त्या काळातील चित्रकारांचे कौशल्य आणि धार्मिक भक्तीचा सुंदर संगम या भिंतींवर पाहायला मिळतो.
चांदोरी येथील विठ्ठल मंदिराच्या बाहेरील भिंतीवर कोरलेले हे भित्तिचित्र लोककथा, पुराणकथा आणि भक्तिसंस्कृती यांचा सुंदर संगम दर्शवते. या चित्रात दिसणारा असुरमुखी, वीर योद्ध्यासारखा पुरुष “राहू” नावाच्या पौराणिक पात्राशी संबंधित असल्याचे मानले जाते.
स्वरभानु हा पुराणांमध्ये उल्लेखलेला एक बलाढ्य राक्षस (असुर) होता. समुद्रमंथनाच्या वेळी अमृत प्राप्त झाल्यावर देवांनी ते स्वतःसाठी राखून ठेवले. तेव्हा स्वरभानुने देवांचा वेष धारण करून सूर्य आणि चंद्र यांच्या मधोमध बसून अमृत पिण्याचा प्रयत्न केला. परंतु सूर्य आणि चंद्र यांनी त्याची ओळख विष्णूंना करून दिली. तत्काळ भगवान विष्णूंनी आपल्या सुदर्शन चक्राने स्वरभानुचे मस्तक छाटले. मात्र तोपर्यंत अमृताचा थेंब त्याच्या कंठात उतरल्यामुळे त्याचे मस्तक अमर झाले. त्याचे छाटलेले मस्तक राहू म्हणून ओळखले गेले, तर त्याचे शरीर केतू म्हणून प्रसिद्ध झाले.
या घटनेनंतर राहू-केतू यांनी सूर्य आणि चंद्रावर सूड घेण्याची प्रतिज्ञा केली. त्यामुळे ग्रहणाच्या वेळी राहू सूर्य किंवा चंद्राला गिळतो असे प्रतीकात्मक मानले जाते.
मराठेशाहीतील या भित्तिचित्रात राहूचे असुरमुखी, परंतु मानवसदृश शरीररूप दाखवले आहे. तो एक पाय वाकवून उभा असून दुसऱ्या हातात आयुध (बहुधा खड्ग किंवा दंड) आणि दुसऱ्या हातात चक्र किंवा वर्तुळाकार वस्तू धारण केलेली दिसते.
डोक्यावर अलंकारिक मुकुट, कानात कुंडले, गळ्यात हार आणि हात-पायात वलये आहेत — जे त्या काळातील योद्ध्यांची राजस पोशाखशैली दर्शवतात.
भिंतीच्या कडेवर कोरलेली फुलांची व वेलबुट्टींची नक्षी ही मंदिराच्या सौंदर्यशास्त्राची साक्ष देते. चित्राची शैली पाहता ते मध्ययुगीन मराठी मंदिरकलेशी सुसंगत वाटते, ज्यात भक्ती, पौराणिकता आणि लोककथा यांचा संगम दिसून येतो.
नाशिक जिल्ह्यातील चांदोरी गावातील विठ्ठल मंदिरासारख्या भक्तिस्थळावर राहूसारख्या ग्रहदेवतेचे चित्रण हे भक्तांना ग्रहदोष, ग्रहण, तसेच कर्मफल यांची आठवण करून देते. हे भित्तिचित्र केवळ सौंदर्यासाठी नसून, धार्मिक शिक्षण, लोककथांचे संवर्धन आणि भक्तीभाव जागवण्यासाठी रेखाटलेले आहे.
“चांदोरी म्हणजे वाड्यांचं गाव” असे म्हटले तर ते योग्य ठरेल, कारण येथे अनेक प्रतिष्ठित सरदार घराण्यांचे भव्य वाडे आजही पाहायला मिळतात.
सरदार हिंगणे यांचा ५६ खोल्यांचा प्रशस्त वाडा इ.स. १७६२ मध्ये बांधण्यात आला असून तो आजही आपल्या भव्यतेने उठून दिसतो.
महादेव भट हिंगणे हे पेशव्यांचे नाशिक येथील क्षेत्रोपाध्ये होते. पेशवे बाळाजी विश्वनाथ हे मराठी साम्राज्याचे पहिले पेशवे पंतप्रधान यांनी महादेव भट हिंगणे यांना १७१८ मध्ये दिल्लीस नेले. पेशवे दिल्लीहून परत आले तेव्हा त्यांनी भरवशाचा माणूस म्हणून महादेव भट हिंगणे यांची वकील म्हणून दिल्लीच्या वकिलातीवर नेमणूक केली. तेव्हापासून नाशिकचे हिंगणे राजकारणात मान्यता पावले. दिल्ली व मराठी माणूस यांचे नाते अतूट आहे. त्या संबंधांचा ऐतिहासिक मागोवा घेतला तर मराठी वकिलातीचे महादेव भट यांच्या रूपाने पहिले पाऊल पडले होते. त्यांना पेशव्यांचे पहिले कारभारी असेही म्हटले जाते. पेशव्यांनी महादेव भट यांच्या एकनिष्ठ कारभारावर खूश होऊन त्यांना मौजे चांदोरी, खेरवाडी, नागपूर व धागूर ही गावे इनाम म्हणून १७३० मध्ये दिली. पेशवाईत सरदार महादेवभट हिंगणे, देवराम महादेव हिंगणे व बापूजी हिंगणे यांची कामगिरी वैशिष्ट्यपूर्ण आहे. बापू हिंगणे हे पानिपतच्या लढाईत नानासाहेब पेशव्यांबरोबर होते.
गणेश हिंगणे यांनी छपन्न खोल्यांचा प्रशस्त वाडा चांदोरीत १७६२ मध्ये बांधला. हिंगणे यांचे काही वाडे झाशी येथे व नाशिकमधील भद्रकालीतही आहेत. हिंगणे यांच्याकडे दहा हजार एकर भूभागाची जहागिरी १९५३ पर्यंत होती. ब्रिटिशांनी सरदार राजेबहादूर, सरदार विंचूरकर व सरदार हिंगणे यांचीच सरदारकी नाशिक जिल्ह्यात मंजूर केली होती. चांदोरी परिसरात जमीन व महसुल यांची मालकी ही हिंगणे यांच्याकडेच होती. त्यांच्या पराक्रमांची साक्ष देणारा चांदोरीतील हिंगणे वाडा तो इतिहास उलगडून सांगतो. हिंगणे वाड्यातील अनेक वस्तू रशिया-ब्रिटनमधील वस्तूसंग्रहालयात आहेत.हिंगणे घराण्याचे वाडे नाशिकच्या भद्रकाली परिसरात तसेच झाशी येथेही होते, यावरून त्यांच्या राजकीय व सामाजिक प्रभावाची कल्पना येते.
चांदोरी परिसरातील महसूल व जमीनमालकी हिंगणे यांच्याकडे असून सुमारे दहा हजार एकर बागायती जमीन त्यांच्या ताब्यात होती, हे त्या काळातील त्यांची संपन्नता दर्शवते. याउलट जगताप देशमुखांचा वाडा आज भग्नावस्थेत असून फक्त भिंती उरल्या असल्या तरी त्यातून त्या काळच्या वैभवाची झलक मिळते. या वाड्यांची रचना मजबूत दगडी भिंती, प्रशस्त अंगण, लाकडी कोरीव काम असलेले दरवाजे, हवेशीर खोल्या, देवघर, दिवाणखाना आणि चौकटदार ओसऱ्यांवर आधारित असून संरक्षणाच्या दृष्टीने उंच भिंती, मजबूत प्रवेशद्वार आणि बंदिस्त मांडणी दिसून येते.
पूर्वी चांदोरी ही दक्षिण भागातील गावांना जोडणारी एक मोठी बाजारपेठ होती, त्यामुळे ती आर्थिक, सामाजिक आणि व्यापारी दृष्ट्या अत्यंत महत्त्वाचे केंद्र मानली जात असे.
आज हिंगणे–जगताप वाडा हा इतिहासप्रेमी, अभ्यासक आणि वारसा जपणाऱ्यांसाठी मौल्यवान ठेवा ठरतो आणि मराठा काळातील ग्रामीण जीवनशैली, प्रशासन व वास्तुकलेचा अभ्यास करण्यासाठी अत्यंत उपयुक्त आहे.
चांदोरीतील हिंगण्यांचा वाडा, मठकरी वाडा, हिंगमिरे वाडा पाहण्यासारखे आहेत. त्याखेरीज टर्ले वाडा जमीनदोस्त झाला आहे. टर्ले म्हणजे मूळचे जगताप. त्यांच्याबाबत आख्यायिका अशी सांगितली जाते, की जगतापांच्या घरी मूल जगत नसल्याने त्यांनी वंश जगावा म्हणून खेडभैरव (तालुका इगतपुरी) येथे बकऱ्याचा बळी देऊ असा नवस केला होता. तेव्हापासून टर्ले-जगतापांच्या सर्व पिढ्या तो नवस फेडण्याची परंपरा पाळतात. गावातून वाहणाऱ्या गोदावरीचे पात्र चंद्रकोरीसारखे असल्याने गावाला चंद्रावती असे नाव पडले अन् पुढे झाले चांदोरी म्हणे!
गावातील बुद्धविहार, लाकडात नक्षीकाम असलेली चावडी वैशिष्ट्यपूर्ण आहे. बाबासाहेब आंबेडकर त्या इमारतीत येऊन गेल्याचे ग्रामस्थ सांगतात. मठकरी वाड्यातील दक्षिणाभिमुख राममंदिर व तेथील रामजन्मोत्सव महाराष्ट्रात आगळेवेगळे आहेत. राम, सीता, लक्ष्मण व हनुमान यांच्या मूर्ती कायम अधांतरी (चौपाळ्यावर) असतात. वाड्यातील शंकराची पिंड स्वयंभू आहे. पूर्व-पश्चितम पिंडी हा त्या मंदिराचा विशेष आहे. रामाने मृगवेध त्या मंदिरातूनच घेतला; तसेच, रामाचे पाऊल तेथे उमटल्याचा दाखला अशा पुराण कथा मंदिराशी जोडल्या गेल्या आहेत. रामनवमीला तेथे मोठी मिरवणूक असते. मंदिरात काचेवर रंगवलेली दशावताराची जुनी चित्रे आहेत. मठकरी वाड्यातील ऑस्ट्रियन बनावटीच्या तीनशे वर्षापूर्वींच्या काचेच्या हंड्या दुर्मीळ आहेत.
ऐतिहासिक पार्श्वभूमी अन् दिल्लीपर्यंत पराक्रम गाजवणाऱ्या माणसांची तेजस्वी चांदोरीची ओळख लोककलावंत माधवराव गायकवाड यांच्याशिवाय अपुरी ठरेल. माधवराव गायकवाडांचे नाव आजही तमाशा क्षेत्रात आदराने आणि गुरूस्थानी घेतले जाते. एकदा दादासाहेब फाळके आपल्या मॉरिस गाडीतून माधवराव गायकवाडांना त्यांनी चित्रपटात काम करावे म्हणून चांदोरीत आले होते. माधवरावांनी मात्र तमाशाच आपली जान आणि शान असल्याचे सांगत फाळकेंना नकार दिला होता. त्यांनी लोककलावंत म्हणून केलेली कामगिरी अजरामर ठरली. त्यांचा १९८७ मध्ये मृत्यू झाला. त्यांचा मुलगा प्रताप गायकवाड वडिलांची परंपरा ‘तमाशा कलावंत’ म्हणून पुढे नेत आहे. चांदोरी नावामागील एक वलय म्हणजे मल्हारराव होळकरांच्या चांदवड टांकसाळीत चांदीचा रुपया तयार होत असे. त्याला ‘चांदोरी रुपया’ म्हटले जायचे. त्याचा चांदोरीशी थेट काही संबंध नसला तरी पराक्रम आणि कामगिरीने लखलखणाऱ्या चांदोरीची भुरळ अनेकांवर पडत असते हे मात्र नक्की!
सातवाहनांचं सातपूर
सरदारांचं कोटमगाव
त्र्यंबकजी डेंगळेंची सासूरवाडी आहेरगाव
दुसऱ्या बाजीराव पेशव्यांचे सेनापती सरदार त्र्यंबकजी डेंगळे कोण होते अन् त्यांचा आहेर गावशी नेमका संबंध काय हे गूढ समजून घेण्यासाठी पेशवाईच्या कारर्किदीवर नजर टाकावी लागते. सतराव्या शतकाचा शेवट अन् आठराव्या शतकाची सुरूवात मराठी साम्राजाला अनेक धक्के देणारी ठरली. यात पेशवाईचा शेवट अंगावर काटे उभे करतो. श्रीमंत माधवराव पेशव्यांचे निधन झाल्यानंतर त्यांचे लहान भाऊ नारायणराव पेशवे झाले, पण त्यांचा खून झाला अन् त्यांचा मुलगा सवाई माधवराव गादीवर आले. मात्र सर्व सूत्रे नाना फडणीसांच्या हाती होती. त्यानंतर पहिल्या बाजीरावांचा पुत्र अन् आनंदीबाईंचे पती रघुनाथरावांकडे पेशवाईची सूत्रे आली अन् अवघ्या एका वर्षात बारभाईप्रकरणामुळे ते पायउतार झाले. पुन्हा सत्ताकेंद्र नाना फडणीसांच्या हाती आली. त्यांनी इंग्रजांना मराठा साम्राज्यापासून दूर ठेवण्यात यश मिळविले असले तरी पेशवाईचा कारभार पेशव्यांच्या वंशजांकडे सोपविण्याचे राजकारण अनेक घडामोडींना अन् अनेक लढवय्यांना तयार करत होते. रघुनाथराव पेशवे व आनंदीबाईंचा मुलगा दुसरा बाजीराव याला नाना फडणीसांच्या कैदेत होता. बाजीराव कैदेतून पेशवे होण्यासाठी खटपट करीत होते.
वेशीसमोर महादेव मंदिराच्या डाव्या हाताला मशीद आहे. मशीदीशेजारीच दातावली ऊर्फ दत्तापीर साहेबांची समाधी आहे. दातावली बाबांच्या अनेक चमत्कारांची माहिती गावकरी देतात. गावातील हिंदू-मुस्लिम समुदायाचे हे ग्रामदैवत असून, पीर साहेबांचा व खंडेरायाचा उत्सव गावात मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो. पीर साहेबांच्या उरसाला १८१८ ला ७०० लोक उपस्थित होते, अशी इंग्रजांच्या दप्तरी नोंद मिळते. गावात महादेव मंदिर, राम, हनुमान, खंडोबा व रोकडोमल महाराज आदी मंदिरे आहेत. गावातील रोकडोमल महाराजांची लाकडी रथातून मिरवणूक काढण्याची परंपरा आहे. रोकडोमल महाराजांचे मंदिर पिंपळगाव रस्त्याला नेत्रावती नदीपलीकडे आहे. येथे सातीआसरा देखील आहेत, .
इंग्रज व गायकवाडांची नाराजी फायद्याची नसल्याचे लक्षात आल्याने नाशिकमध्ये लग्नासाठी दाखल झालेल्या गंगाधरशास्त्रींनी लग्न मोडले. त्यानंतर काही महिन्यांनी पेशवे व गंगाधरशास्त्री पंढरपुरात विठ्ठलाच्या दर्शनासाठी आले असतांना एका पहाटे गंगाधरशास्त्रींचा खून झाला. हा खून लग्न मोडल्याच्या संतापातून त्र्यंबकजीने करविल्याचा आरोप इंग्रज अधिकारी एल्फिस्टन यांनी केला व त्र्यंबकजींना अटक करण्याची मागणी केली. गंगाधरशास्त्री इंग्रजांचे वकील असल्याने त्यांच्या संरक्षणाची जबाबदारी आपली असल्याचे सांगत इंग्रजांनी त्र्यंबकजींच्या अटकेसाठी पेशव्यांकडे ससेमिरा सुरू केला. अखेर त्र्यंबकजींना अटक झाली.
इ.स.१८१६ साली ठाण्याचा किल्ल्यात (म्हणजे आजचे ठाणे कारागृह) त्र्यंबकजी पहिले राजबंदी होते. मात्र या वादळाला थोपविणे शक्य नव्हते. त्र्यंबकजी मोठ्या शिताफीने इंग्रजांच्या हातावर तुरी देऊन तेथून निसटले. पुढे त्यांनी फौज गोळा करून इंग्रजी मुलखात मोठा धुमाकूळ घातला. इंग्रजांच्या अनेक तहांना आणि अटींना कंटाळून १८१७ ला बाजीराव पेशव्यांनी सरदार बापू गोखले, कारभारी मोरदीक्षित यांना हाताशी घेऊन, त्र्यंबकजी डेंगळे तसेच शिंदे-होळकर-भोसले यांच्या बळावर इंग्रजांविरुद्ध युद्धाची घोषणा केली. स्मिथ आणि एल्फिस्टन या इंग्रज अधिकांऱ्यांनी त्र्यंबकजींसाठी पेशव्यांवर दबाव वाढविला. डेंगळेंची अटक टाळण्यासाठी पेशव्यांनी अनेक प्रयत्न केले. अखेर त्र्यंबकजी हाती येत नसल्याने पेशवाई ताब्यात घेण्याची धमकी देणे सुरू केल्यावर तडजोड म्हणून त्र्यंबकजींच्या जामिनापोटी सिंहगड, पुरंदर, रायगड हे किल्ले इंग्रजांच्या स्वाधीन करण्याची वेळ पेशव्यांवर आली. हा तह १३ जून १८१७ रोजी पार पडला. मात्र इंग्रजांच्या सततच्या पिच्छामुळे अन् पेशव्यांनीही हतबलता दाखविल्याने त्र्यंबकजी गहिवरले. त्यांनी या सर्वांतून निवृत्त होत सांसरीक जीवन जगण्यासाठी निवडले ते म्हणजे नाशिकजवळचे आहेरगाव. आहेरगाव ही त्र्यंबकजींची सासूरवाडी. त्यांची पत्नी येथील देशमुखांच्या घरातील. हाती असलेल्या पैशातून गुरे घेऊन आहेर गावात कुटुंबासह राहू लागले. यादरम्यान गावातील अवचीत अन् कवचीत यांच्याशी वाद झाले असावेत यातून त्र्यंबकजीने त्यांना जखमी केले. या घटनेमुळे गवळी कुटुंबातील महिला दुखावली. या घटनेचा सूड उगविण्यासाठी तिने चांदोर (आताचे चांदवड) येथे जाऊन त्र्यंबकजी आहेरगावात लपल्याची खबर दिली. कॅप्टन ब्रीजच्या रिपोर्टनुसार, त्र्यंबकजीने गावातील एका व्यक्तीला जखमी केले होते. याचा सूड घेण्यासाठी त्या व्यक्तीच्या पत्नीने चांदोरला जाऊन त्र्यंबकजींबद्दल माहिती दिली.
कॅ. ब्रीजने कॅ. स्वान्स्टन याला सैन्यांसह पाठवून गावाला वेढा दिला. त्र्यंबकजी एका घराच्या तळघरातील गवऱ्या ठेवण्याच्या ढिगाऱ्याखाली लपलेल्या स्थितीत सापडला, असे गावकरी सांगतात. या घटनेनंतर त्र्यंबकजींना अटक करून चांदवडला व नंतर बंगालमधील चुनारगढच्या कारागृहात हलविण्यात आले. यानंतर त्र्यंबकजी डेंगळेंचे काय झाले. त्यांच्या कुटुंबाचे काय झाले हे याची कोणतीच माहिती उपलब्ध नाही.
गाववेशीतून बाहेर पडल्यावर डाव्या हाताला दोन दीपस्तंभ व त्यासमोरील अनोखी वीरगळ नजरेत भरते.
यातील एका दीपस्तंभावरील शिलालेख पुसट झाल्याने वाचता येत नाही. तर दुसरा स्तंभ ही वीरगळ आहे. तिची उंची अधिक असल्याने ही त्र्यंबकजींची वीरगळ असावी का? असाही कयास बांधता येतो. जवळच नेत्रावती किनारी त्र्यंबक डेंगळेंच्या पत्नीची समाधी आहे. ही सती गेल्याचे म्हटले जाते. सतीमातेच्या या समाधीचा जीर्णोद्धार करण्यात आला आहे. त्र्यंबकजींची पत्नी सती गेली असेल तर त्र्यंबकजींना मृत्यूनंतर त्यांना गावात आणले असावे का? की कारागृहातून सुटल्यानंतर ते पुन्हा आहेरगावात आले असावेत अन् तेथेच त्यांचा मृत्यू झाला असावा. हा अज्ञात इतिहास अस्वस्थ तर करतोच; पण एक मुत्सद्दी अन् लढवय्या सेनापतीची अखेर नेमकी कशी झाली असेल अशा अनेक प्रश्नांनी मन भांबावून जाते. म्हणूनच आहेरगाव वेगळे ठरते!
सायखेड्याचे अत्यंत सुरेख श्री नृसिंह मंदिर
सरदार विंचूरकर जहागीरदार यांना अंदाजे ४०० वर्षांपुर्वी त्यांना ईनाम म्हणुन मिळालेल्या व नंतर त्यांची उपराजधानी असलेल्या आत्ताचे सायखेडा व पूर्वीचे शामराजक्षेत्र येथे सापडलेली श्रीलक्ष्मीनृसिंहाची अतिशय सुरेख मुर्ती.
लोणजाई टेकडी
| रस्त्यावरून दिसणारी लोणजाई टेकडी |
| लोणजाई टेकडी |
| लोणजाई टेकडी पायथा |
| लोणजाई टेकडी वरून |
| निफाडच्या शेतीचे दृश्य |
| अन्य रांगा |
| लोणजाई मंदीर |
| लोणजाई देवी |
| लोणजाई मंदीर बांधकाम अवस्थेत |
म्हसरूळचे श्रीक्षेत्र सीता सरोवर-श्रीराम मंदिर : एक प्रेक्षणीय स्थळ

म्हसरूळ याठिकाणी प्रभू श्रीराम-सीतामाई व लक्ष्मण यांनी तब्बल सव्वा महिना मुक्काम केला. जमिनीवर मारलेल्या बाणाने उपलब्ध झालेले पाणी पुढे पिण्याबरोबरच वापरासाठीही श्रीराम-सीतामाई व लक्ष्मण यांनी उपयोगात आणले, अशी अख्यायिका आहे. आज श्रीक्षेत्र सीता सरोवर म्हणून ओळखले जात असलेल्या या पवित्र सरोवरात श्रीराम व सीतामाई असे दोन कुंड आहेत. पूर्वी ब्रिटिश सरकारच्या काळात वाहत्या पाण्याचा उपयोग पिण्यासाठी योग्य असल्याने ब्रिटिशांनी दगड बांधकाम करून कुंड सुशोभित केले व गोड, चवदार, स्वच्छ पाणी म्हणून काही वर्षे ब्रिटिशांनी व पुढे म्हसरूळ ग्रामस्थांनी सीता सरोवरातील पाण्याचा पिण्यासाठी वापर केला असल्याचे ज्येष्ठ तसेच आजही अनेक वडीलधार्यांकडून सांगितले जाते. विशेषतः पूर्वी म्हसरूळ गाव – सीता सरोवर याठिकाणी दरवर्षी पौष महिन्यात दर रविवारी मोठी यात्रा भरते.
म्हसरूळ ग्रामस्थांचे पुरातन श्रीक्षेत्र सीता सरोवर व ज्या ठिकाणी प्रभू श्रीराम-सीतामाई यांची कुटी होती, आज तेच ठिकाण पुरातन श्रीराम-सीतामाई व लक्ष्मण मंदिर असून हेही एक मुख्य श्रीराम मंदिर म्हणूनच ओळखले जात आहे. दरवर्षी सीता सरोवर- राम मंदिर येथे म्हसरूळ गाव भजनी मंडळ व श्रीराम भक्त परिवार यांच्या वतीने मोठ्या उत्साहात विविध धार्मिक कार्यक्रम तसेच श्रीराम जन्मोत्सव साजरा केला जातो. याठिकाणी मुख्य नावाजलेले साधू-महंत यांनी भेट देऊन संत-महंत भोजनाचा लाभ घेतला आहे व आजही घेत आहेत. प्रामुख्याने आज म्हसरूळ ग्रामस्थांकडून सीता सरोवराची तर श्रीराम मंदिराची देखभाल शर्मा परिवाराकडून केली जाते. म्हसरूळचे पुरातन श्रीक्षेत्र सीता सरोवर सुशेभिकरणासाठी नाशिक महापालिकेचे सहकार्य मिळाले आहे. याशिवाय नुकतेच केंद्र सरकारने रामायण सर्किटमध्ये म्हसरूळ गाव-सीता सरोवरचा प्रेक्षणीय स्थळ म्हणून समावेश केला आहे. तर यापूर्वीच प्रभू श्रीराम जन्मभूमी अयोध्या न्यास समितीने आपल्या दप्तरी नोंद केली आहे. त्याचा पुरावा म्हणून अयोध्या येथून संगमरवरीत श्रीराम यांच्या चरणपादूका सात वर्षे पूर्वीच म्हसरूळच्या पुरातन श्रीराम मंदिर येथे पाठविण्यात येऊन विधीवत पुजनाने प्रतिष्ठान करण्यात आले आहेत.
मोहाडीचे अष्टबाहू गोपालकृष्ण मंदिर
दुर्मिळ व एकमेवाद्वितीय अशी मूर्ती असलेले मोहाडीचे अष्टबाहू गोपालकृष्ण मंदिर
दिंडोरी तालुक्यातील मोहाडी या गावाचे मुख्य दैवत आहे श्रीकृष्ण. या गावातील श्रीकृष्णाच्या मंदिराचे एक अनोखे वैशिष्ट्य आहे. ते म्हणजे येथे असलेली गोपालकृष्ण स्वरूपातील अष्टबाहू मूर्ती. या मूर्तीची प्रतिष्ठापना नेमकी कधी झाली अज्ञात आहे. मात्र पुरातनकाळापासून ही वैशिट्यपूर्ण मूर्ती असलेल्या या मंदिरात येथील ग्रामस्थ गोपाळकृष्णाची मनोभावे आराधना करीत आहेत.
मराठाकालीन शैलीतील दुमजली काष्ठ सभामंडप असलेले हे मंदिर पाहताक्षणीच प्रेमात पडावे असे आहे. या मंदिराची तीन मजली इमारत काष्ठवास्तुशैलीचा उत्तम नमुना असून पाच खण रूंद व सात खण लांब असे हे मंदिर आहे. या सभामंडपातील गाभाऱ्यात ही देखणी मूर्ती स्थापित केलेली आहे. गाभाऱ्यावर ज्ञानेश्वर माऊली, संत तुकाराम महाराज व संत नामदेव महाराज यांच्या प्रतिमा बसविण्यात आल्या आहेत.
गाभाऱ्यातली शाळीग्राम पाषाणातील अष्टबाहू गोपालकृष्ण मूर्ती अतिशय देखणी व मंत्रमुग्ध करणारी आहे. कृष्णाने एका हाताच्या करंगळीने गोवर्धन पर्वत उचलला आहे, दोन हातात मंत्रमुग्ध करणारी मुरली, इतर हातांमध्ये चक्र, गदा, शंखमाला, मोशृंग इत्यादी आयुधे आहेत. कमरेस लंगोट त्यावर घागऱ्यास दागीनापट्टा आहे. कृष्णाच्या अंगाभोवती असणाऱ्या कालियाचा विळखा अन् तो कृष्णाच्या कानाला दंश करतो आहे. चरणकमलाजवळ दोन गोपी असून, त्यापैकी एक मृदुंग वाजवीत आहे. तर दुसरी सनई वादन करीत आहे. शेजारी दोन सवत्स धेनु आणि गरूड उभे आहेत.
या मूर्तीविषयी एक आख्यायिका इथे प्रचलित आहे. प्राचीन काळी केव्हातरी एक मूर्तीकार कन्याकुमारीहून उज्जैनला जाण्यासाठी एका रात्री मोहाडीत थांबला होता. सोबत त्याने तयार केलेली ही अष्टबाहू गोपाळकृष्णाची मूर्ती होती. पुढे जाण्यासाठी सकाळी जेव्हा तो तयार झाला तेव्हा जमिनीवर ठेवलेली अष्टबाहू गोपालकृष्णाची मूर्ती त्या मूर्तीकारास उचलता येईना. मूर्तीकारांनी कुऱ्हाडीचा प्रहार करून मूर्ती हलविण्याचा प्रयत्न केला पण मूर्ती काही हलली नाही. तेव्हा मूर्तीकार ही मूर्ती गावातच सोडून गेले. आजही कुऱ्हाडीचा प्रहार मूर्तीच्या मागील बाजूस पहायला मिळतो,
सावरकर जन्म स्थान (सावरकर वाडा), भगूर
भगूर म्हणजे स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांचं गाव. जाज्वल्य. देशाभिमान - प्रखर धर्मनिष्ठा-विज्ञानाचं महत्त्व ओळखणारा अन् ते पाळण्यास स्वतःपासून आरंभ करणारा भारतमातेचा महान सुपुत्र म्हणजे तात्याराव सावरकर ! 'याल तर तुमच्यासह...', 'धर्मांतर म्हणजे राष्ट्रांतर', 'धर्मातील अनिष्ट रूढी अन् परंपरा त्यागणे सर्वथैव श्रेयस्कर', 'धर्मशुद्धी-भाषाशुद्धी-लिपीशुद्धी यांचा पराकाष्ठेचा आग्रह' हे आणि असेच असंख्य संदेश, आपल्या सर्वार्थानं जगलेल्या आयुष्यातून देणाऱ्या ह्या स्वातंत्र्यवीरांची स्फूर्तिदेवता-नव्हे, स्वातंत्र्यलक्ष्मी पाहण्यासाठी 'भगूर' ह्या ठिकाणी जावं लागतं.
दारणा नदीच्या किनाऱ्यावर वसलेल्या नाशिक जिल्ह्यातील भगूर या गावाला प्राचीन इतिहास आहे. पूर्वी येथे महर्षी भृगू ऋषींचे वास्तव्य होते. ते स्थापत्यशास्त्राचे तज्ज्ञ समजले जात. नाशिकमधील काळाराम मंदिर भृगूवास्तुशास्त्रानुसार बांधल्याचे मानले जाते. त्यांनी ऋग्वेद, अथर्ववेद, भृगूसंहिता, भृगू आयुर्वेदसंहिता, भृगूस्मृती (मनस्मृती), भृगू गीता (वेदान्तविषयक), भृगूसिद्धांत आणि भृगूसूत्र आदी ग्रंथ लिहिले. असे सांगितले जाते की भृगू ऋषींनी दंडकारण्यातील या परिसरात साधना केली व गुरुकुल उभारले, म्हणून या परिसराला ‘भार्गव’ असे नाव पडले होते. त्याचे पुढे ‘भगूर’ झाले. भृगू ऋषींचे वास्तव्य, शिवकाळ, पेशवाईतील कर्तृत्वाच्या कहाण्या, असा वारसा भगूरला लाभला आहे. सावरकरांनी भगूरवर लिहिलेली ‘भार्गव’ ही कविता गावाचे महात्म्य वर्णन करते. सशस्त्र चळवळींमुळे इंग्लंडमध्ये ‘डँबिस गाव’ अशी भगूरची नोंद होती.
लोकमान्य टिळकांनी स्वराज्य चळवळीचे रणशिंग फुंकण्यापूर्वी भारताच्या संपूर्ण स्वातंत्र्याची जाहीर मागणी करणारे प्रथम भारतीय म्हणून स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांची ओळख आहे. ‘क्रांतिसूर्य’ म्हणूनही त्यांना ओळखले जाते. २८ मे १८८३ रोजी भगूर या गावात विनायक दामोदर सावरकर यांचा जन्म झाला. सावरकरांच्या नात्यातील एक पराक्रमी पूर्वज विनायक दिक्षित यांचे नाव या नवजात बालकाला दिले गेले. तिथे त्यांच्या पूर्वजांचा वाडा होता. वडील जहागीरदार असल्यामुळे लहानग्या विनायकास लोक ‘छोटे जहागीरदार’ असे म्हणायचे.
सावरकर यांना आईचे छत्र फार काळ लाभले नाही. आईनंतर मोठ्या भावाची पत्नी येसू वहिनीने त्यांना आईची माया दिली. तिच्या मार्गदर्शनाखाली सावरकर शिकू लागले, कविता करू लागले. वयाच्या आठव्या वर्षी त्यांनी रामायण, महाभारत या ग्रंथांसह घरात असणारी ऐतिहासिक पुस्तके वाचून काढली होती. नाशिकमधील एका स्पर्धेसाठी शिवजयंतीनिमित्त सावरकरांनी शिवरायांवर गीत लिहिले होते. त्या गीतासाठी लोकमान्य टिळकांच्या हातून त्यांना पारितोषिक मिळाले होते. तेव्हापासून त्यांनी देशकार्याला वाहून घेतले. चाफेकर बंधूंकडे पाहून त्यांनी आपणही क्रांतिकारक बनायचे, असे मनोमन ठरवले व पुढे मित्र मंडळ मेळावा स्थापन केला.

आपण ह्या घरात धान्य ठेवण्याची जुनी व्यवस्था पाहू शकतो. धान्य ठेवण्यासाठी भिंती बांधून साठवणीची जागा तयार केली आहे. खालच्या मजल्यावर तिला एक लहान तोंड केलेले आहे. वरून पाहिल्यास ते लिफ्ट च्या शाफ्टसारखे दिसेल. जेव्हा जेव्हा धान्य आवश्यक असेल तेव्हा खालच्या मजल्यावरील तोंडातून धान्य घ्यायचे!

असे सांगितले जाते की विनायक सावरकर यांचे वडील दामोदर सावकरकरांच्या पणजोबांना लुटारूंना पिटाळून लावताना अष्टभुजा भवानीची मूर्ती मिळाली होती. ही देवी पुढे सावरकर कुटुंबीयांची कुलदैवत झाली. देवीला पूर्वी बोकडाचा बळी दिला जात असे. त्यामुळे देवीची मूर्ती खंडोबाच्या मंदिरात ठेवण्यात आली. मात्र, दामोदरपंतांना झालेल्या स्वप्नदृष्टांतानुसार ‘मला घरी घेऊन जा’ असे या देवीने सांगितले. त्यामुळे ही मूर्ती सावरकरवाड्यात आणण्यात आली. १८९८ मध्ये झालेल्या प्लेगच्या उद्रेकानंतर विनायक दामोदर सावरकर यांनी घरातील या देवीसमोर आपल्या साथीदारांसह देश स्वतंत्र करण्याची शपथ घेऊन स्वातंत्र्य चळवळीत उडी घेतली. तेव्हापासून या अष्टभुजा देवीला स्वातंत्र्यलक्ष्मी असे म्हटले जाऊ लागले.
या मूर्तीचा इतिहास समग्र सावरकर खंड १ ला (१ ली आवृत्ती) शके १९१४, सन १९९३ मध्ये १० व्या पृष्ठावर नोंदवलेला आहे. स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या आईच्या वडिलांची 'मकराणी' स्वारांची तुकडी होती. त्यांच्या मदतीनं त्यांनी लुटारूंच्या टोळीचा बंदोबस्त करून त्यांच्या देवीची मूर्ती स्वतःच्या ताब्यात आणली. स्वातंत्र्यवीरांची आजी ती मूर्ती घेऊन भगूरला आली. ह्या अष्टभुजा महिषासुरमर्दिनीची ही मूर्ती सावरकर मंडळींनी स्वतःची कुलदेवी म्हणून पुढे स्वीकारली. ह्या जाज्वल्य देवीपुढं बळी देता यावा म्हणून काही काळ ती मूर्ती खंडोबाच्या मंदिरात ठेवली होती. पुढे नवीन घरी गेल्यावर त्यांनी ती मूर्ती स्वतःच्या घरीच आणली..
या देवी सर्व भूतेषु बुद्धिरूपेण संस्थिता । नमस्तस्यै नमस्तस्यै नमस्तस्यै नमोनमः ।।
या देवी सर्व भूतेषु शक्तिरूपेण संस्थिता । नमस्तस्यै नमस्तस्यै नमस्तस्यै नमोनमः ।।
हा सप्तशतीतील देवीस्त्तीचा मंत्र व ही श्रीदेवी प्रतिमा यांनी बाल विनायकांच्या मनावर खूपच मोहिनी घातली होती.
पुढे वासुदेव चाफेकर अन् रानडे फाशी गेले, तो वृत्तांत विनायकरावांनी वृत्तपत्रात वाचला तेव्हा त्यांच्या मनात स्फुल्लिग निर्माण झाला. त्याच तिरीमिरीत ते देवघरात गेले. सुगंधी फुलांचा दरवळ पसरला होता, तुपात भिजलेल्या निरांजनातील वातीचा मंद प्रकाश पडला होता. उदबत्त्यांचा घमघमाट सुटला होता. तेव्हा महिषासुरास तुडवणारी, सिंहारूढ असणारी, सांगसायुध अष्टभुजा त्यांच्याकडे पाहत मंदस्मित करीत आहे असं त्यांना वाटलं. त्यांचं हृदय उचंबळून आलं. वयाच्या अवघ्या १५ व्या वर्षी त्यांनी देवीच्या चरणांना स्पर्श करून शपथ घेतली... यापुढं मी माझ्या देशाचं स्वातंत्र्य परत मिळविण्यासाठी सशस्त्र क्रांतीचा केतु (सेतु ?) उभारून 'मारिता मारिता मरेतो झुंजेन'...
या शपथेमुळेच जी ठिणगी पेटली त्यामुळे किती घात-प्रत्याघात, किती रक्तपात, वध, फाशी, वनवास, छळ, यश आणि अपयश, दौरात्म्य आणि हौतात्म्य, प्रकाश आणि अंधार, आगीचे अन् धुराचे कल्लोळ उठले. अभिनव भारताची क्रांतिकारक संस्था यामुळेच स्थापली गेली अन् विनायक दामोदर सावरकर यांच्या आयुष्याला निश्चित अशी दिशा मिळाली.
ही प्रतिज्ञा घेतल्यानंतर विनायकरावांनी स्वतःला 'दुर्गादास' असं टोपणनाव घेतलं आणि लिखाणाच्या आधी श्रीकाराच्या जागी- 'श्री योगेश्वरी प्रसन्न' असं ते लिहू लागले. आपल्या आत्मचरित्राला (जे पुढे कालगतीत नाहीसं झालं) त्यांनी दुर्गादासचरित्र असं नावही दिलं. त्या स्वातंत्र्यलक्ष्मीच्या मूर्तीला त्यांच्या जीवनात अनन्यसाधारण महत्त्व आहे.
देवीची ही मूर्ती अतिशय सुंदर आहे आणि ती पंचधातूची बनवलेली असावी असे वाटते. मूर्तिशास्त्रदृष्ट्या अद्वितीय नसली, तरी ही माता भवानी देखणी आहे. सांगसायुध असणारी ही अष्टभुजा महिषासुरमर्दिनी आहे. उजव्या खालच्या हातात आज जरी कोणतंच हत्यार नसलं, तरी त्यामध्ये महिषासुराच्या शरीरात घुसणारा त्रिशूळ असावा, असा तर्क करता येतो. उजव्या बाजूच्या खालून दुसऱ्या हातात पात्र आहे. त्यानंतरच्या हातात तलवारीची मूठ दिसते. पण त्याचं पातं गायब झालं आहे. उजव्या बाजूच्याच चौथ्या वरच्या हातात शंख धारण केलेला आहे. वरच्या डाव्या हातात कमलकलिका, त्यानंतरच्या हातातील धनुष्य मात्र भग्न झालं आहे. त्याखालच्या डाव्या हातात कट्यारीसारखं वाकडं पातं असलेलं शस्त्र आहे आणि सर्वात खालच्या डाव्या हातात महिषासुराची शेंडी पकडून त्याचं मस्तक उखडून टाकण्याचा पवित्रा दिसतो. देवीच्या डाव्या पायाशी महिषासुर आहे, तर उजव्या पायाजवळ वाघ आहे. मूर्ती एका सुबक पीठावर आहे. त्यावर असणाऱ्या नक्षीकामात खास उल्लेखनीय काही नसलं तरीही ते सुबक आहे.
स्वातंत्र्यलक्ष्मी अष्टभुजा देवीची ही मूर्ती सुंदर आहे. सध्या गावातील खंडोबा मंदिरात ती विराजमान आहे. या मंदिराच्या गर्भगृहात खंडोबा, बाणाई व म्हाळसादेवी यांचे स्थान आहे, तर खालच्या बाजूला शिवपिंडी आहे. त्यांच्या मधोमध स्वातंत्र्यलक्ष्मी अष्टभुजा देवीची मूर्ती आहे. या मंदिरात नवरात्रोत्सव उत्साहाने साजरा केला जातो. पहिल्या दिवशी विधिवत पूजा–अर्चा करून येथे घटस्थापना केली जाते. नवमीला सकाळी देवीस पंचामृताने आंघोळ घातली जाते. दसऱ्याच्या दिवशी अष्टभुजा देवी व खंडेराव महाराज यांच्या मूर्तींची पालखीतून मिरवणूक काढण्यात येते. ही मिरवणूक येथून जवळच असलेल्या देवळाली कॅम्पमधील रेणुका मातेच्या मंदिरात सीमोल्लंघनासाठी जाऊन पुन्हा पालखी गावात येते. नवरात्रोत्सवात येथे शेकडो भाविक दर्शनाला येत असतात.
मग बाबाने आपली आणि भावाची त्याच्याशी ओळख करून दिली.
त्याने विचारले,' ही तलवार कुणाची? आणि कुठून आणली ही?'
त्यावर विनायकानेच पुढे होऊन उत्तर दिले, ' आमच्या शूर घराण्याची तलवार आहे ही.'
यावर पर्किन्स तलवार विनायकाच्या हाती देत म्हणाला, 'मग आता तूही ही तलवार घेऊन पराक्रम कर!'
पुढे योगायोग असा कि सावरकरांना मार्सेलिसला पकडुन मुंबईस आणले तेव्हा याच पर्किन्सने त्यांना ताब्यात घेतले. लहानपणी पाहिलेले त्याच्या हातावर गोंदवलेल्या विंचवाच्या चित्रामुळे सावरकरांनी त्याला ओळखले. सावरकरांनी त्याला त्या जुन्या प्रसंगाची आठवण करून दिली आणि तो प्रसंग आठवून तोही चकीत झाला.

सावरकर वाडा म्हणून ओळखली जाणारी ही वास्तू बरीच वर्षे भारतीय पुरातत्व विभागाकडे होती. जॅक्सनवधानंतर सावरकरांचा दुमजली वाडा ब्रिटिश सरकारने जप्त करून लिलावात विकून टाकला होता.इंग्रजांकडून मारुतीराव चव्हाण यांनी ते खरेदी केले. पुढे ते पांडुबा चव्हाण यांनी घेतले. लिलावात घेणार्याने तेथे खोल्या करून भाडेकरू ठेवले होते. केंद्र सरकारने तत्कालीन मालक-भाडेकरूंना नुकसान भरपाई देऊन ते ताब्यात घेतले आणि पुरातत्व खात्याकडे दिले. २८ मे १९९८ रोजी सावरकर स्मारकात रुपांतरित केले. अत्यंत पडझड होऊन गेलेल्या त्या वाड्याला शक्य तितके मुळ स्वरूप देण्याचा प्रयत्न त्या खात्यामार्फत करून ते आता लोकांना सकाळी १० ते ५ पाहाता येते. सोमवारी सुट्टी असते. या वाड्यामध्ये सावरकर यांचा जीवनपट दुर्मिळ छायाचित्रांच्या माध्यमातून पाहायला मिळतो. त्यात सावरकरांचे जन्मस्थान, जेथे अष्टभुजा मूर्तीची स्थापना केली होती, ते देवघर आहे. याशिवाय त्यांची वंशावळ येथे दाखविली आहे.
देवठाण
गाव ही संकल्पना अस्तित्वात आली तसे तिचे अनेक पैंलूही निर्माण झाले. मौजे आणि कसबा, बुद्रूक आणि खूर्द. व्यापार, हुन्नर व कसबी मजुरी करणारे लोक मौजेपेक्षा कसब्यात अधिक असतात आणि कसब्याखाली वाड्याही जास्त असतात. कसब्याचे गाव मौजेपेक्षा जास्त विस्तृत, चव्हाट्याचे, रोजगारी व संपन्न असते. तसेच खेडणे म्हणजे जमीन कसणे आणि खेडू म्हणजे जमीन कसणारा. तेव्हा खेडूंची जी वस्ती ते खेडे. तर ठाण म्हणजे व्यापारी, बाजारपेठेचे ठिकाण, श्रीमतांची वस्ती म्हणजे ठाणं. बुद्रक म्हणजे थोरला, वयस्कर, मोठा तर खूर्द म्हणजे खूर्दा, चिल्लर, किरकोळ अथवा लहान. जमीनदार, मालदार, मोठे लोक कसबे, बुद्रुक व ठाणं मध्ये निवासाला असत. त्यांचे कामगार मजूर अन्य मौजे, खुर्द वा खेड्यात राहत. पूर्वी ही वर्गव्यवस्था होती. दोन्ही वस्त्यांमध्ये थोडे अंतर असे एखादा रस्ता, नाला वा नदी अशी सीमा असे. जसे देवठाण व भायखेडे यांच्यामध्ये नदी आहे. तशीच ठाणं ही संकल्पना आजही वापरात आहे; मात्र आज तिला गाव म्हटले जात नाही. एखाद्या देवतेचं ठाण, पीराचं ठाण म्हणून आपण त्या ठिकाणांचा उल्लेख करतो. तसेच देवनदीच्या कुशीत वसलेलं देवाचं ठिकाण म्हणूनही देवठाण असे या गावाला नाव पडले असावे, म्हणूनच देवठाणचा प्रवास अनेक अंगांनी पडलेल्या प्रश्नांची कोडी उलगडतो. नाशिकहून येवला अन् येवल्यातून छ्त्रपती संभाजीनगर महामार्गावर साधारण २० किलोमीटर गेल्यावर छ्त्रपती संभाजीनगर जिल्ह्याच्या हद्दीवर देवठाण गाव देव नदीच्या किनारी वसले आहे.
माणूस निसर्गपूजकाकडून मूर्तीपूजक कधी झाला हा प्रवासही रम्य तितकाच गूढ आहे. त्रिरश्मी डोंगरावरील पांडव (बौद्ध) लेणीचे उदाहरण पाहिले तर पूर्वीचे राजे बौद्ध भिक्षुकांना दान द्यायचे. या दानातून बौद्ध भिक्षुक पूजापाठासाठी तसेच पावसापासून रक्षण होण्यासाठी लेणी खोदून (कोरून) घ्यायचे. दोन हजार वर्षांपूर्वी दिसणारी बौद्ध लेणी खोदण्याची परंपरा सातव्या आठव्या शतकानंतर बंद झाली. त्यानंतर जैन व हिंदू धर्मियांना राजाश्रय मिळाल्याने त्या लेणींची निर्मिती झालेली दिसते. कलचुरींच्या नंतर राष्ट्रकूट राजघराण्याचा अंमल महाराष्ट्राच्या विस्तृत प्रदेशावर सुरू झाला. राजघराण्यात हिंदू धर्माला अधिक उत्तेजन दिले जाऊ लागले. या काळात लेणींबरोबरच पहिल्यांदा बांधीव मंदिरांनाही प्रोत्साहन मिळू लागले अन् लेणी युग मागे पडून मंदिर युगाला सुरूवात झाली. मात्र उद्देश बदलला नाही. लेणी ही जशी आश्रय अन् पूजापाठाची जागा होती तशीच मंदिरंदेखील होती. बहुतेक, माणूस याच काळात मूर्तीपूजक झाला असावा. मात्र ऋग्वेदाच्या पहिल्या मंडळात मूर्तीचे उल्लेख येतात. देवालय म्हणजे मानवी शरीर, शिखर म्हणजे शिर, त्याखाली बेकी म्हणजे मान, मग स्कंध, गाभारा म्हणजे ह्दय, मग मंडोवर म्हणजे छाती, पोट हा भाग, कटिभाग म्हणजे जंघा इत्यादीचा उल्लेख अग्निपुराणातही येतो. या आधारेच मंदिर या वास्तूची संकल्पना उभी राहिली. एखादे मंदिर कसे पहावे अन् अनुभवावे हे देखील ही मंदिराची रचना आपल्याला शिकवते. मूर्ती नसलेली मंदिरे ही लेणीनंतर साकारलेल्या गेलेल्या मंदिरांची स्थितीही सुरूवातीला मठ या परिभाषेला पुढे घेऊन जाणारी असावी. भाविकांसाठी आश्रयाचे ठिकाण, त्या-त्या गावातील बाजारपेठेचे ठिकाण, सामाजिक, सांस्कृतिक व धार्मिक चळवळींचे ठिकाण म्हणूनही मंदिर संकल्पना अधिक उपयोगी ठरली असावी. लग्न, मुंज, कौंटुंबिक कार्यक्रम तसेच कीर्तने, चर्चा, ग्रामसभा भरविण्याचे ठिकाण म्हणूनही भव्यदिव्य मंदिरासारख्या दिसणाऱ्या मात्र मूर्ती नसलेल्या वास्तूंची निर्मिती झाली असावी.
देवठाणचे हेमाडपंती मंदिर पाहतांना धर्मभावना बाजूला ठेऊन मंदिर रचना, स्थापत्य अन् त्याचा हेतू या अंगाने या वास्तूकडे पाहिले तर त्यावेळचे ग्रामजीवन आपल्या डोळ्यासमोर नांदताना दिसते. प्रत्येक मंदिराच्या निर्मिती मागील उद्देश देव, भक्त आणि भक्तिबरोबरच त्या गावाला एकत्रित ठेवणे हाही असतो. मंदिर ही संकल्पना आकाराला येत असताना देवाचं ठाणं म्हणजेच देवघर! फक्त मंदिर म्हणून नव्हे तर सामाजिक, आर्थिक व सांस्कृतिक चळवळीचे केंद्र असल्याची साक्ष येवल्याचे देवठाण गाव देतं. म्हणूनच शिल्पसौंदर्यानं नटलेलं देवठाणचं हेमाडपंती मंदिर हे मंदिरांचा आत्मा वाटू लागतो.
देवठाणचे मंदिरही मंदिराच्या उत्क्रांतीच्या क्षणाला म्हणजे साधारण इ.स. ८५० ते १०६० या काळात साकारले गेल्याचा दावा केंद्रीय पुरातत्त्व विभाग करतो.
महामार्गावरून जाताना देवठाणचा फलक लागेल व गाव दिसेल अशी अपेक्षा न केलेलीच बरी. कारण फलक शोधता शोधता आपण वैजापूर हद्दीत कधी दाखल होतो हे लक्षातही येत नाही. त्यामुळे विचारत विचारतच जाणे योग्य. एका मोडकळीस आलेल्या बसस्टॉप व लहानशा चौफुलीवरून डाव्या हाताने दोन किलोमीटर आत जाताना भासणारा ओसाड परिसर खिन्न करतो. दहा मिनिटांच्या सुनसान प्रवासानंतर पन्नासएक घरांचे लहानशे गाव लागते. गावात प्रवेश करताना डाव्या हाताला एक लहानशे मंदिर आपले स्वागत करते. गावात गेल्यावर दगडी बांधणीच्या दोन घरांच्या मधून एक रस्ता देवठाणच्या महादेव मंदिराकडे आपल्याला घेऊन जातो. येथेच पूर्वी वेस होती. मात्र आता ती कोसळल्याने तिचे अस्तित्व दिसत नाही. वेशीतून आत गेल्यावर एका लहानशा टेकडावर चौकोनी आकाराचे मंदिर इतर मंदिरापेक्षा वेगळ्यापद्धतीने साकारलेले पहायला मिळते. ही वास्तू केंद्रीय पुरातत्त्व विभागाने २५ सप्टेंबर १९१५ रोजी संरक्षित केली. त्यांच्याकडून होत असलेल्या देखभालीमुळे मंदिराभोवती कंपाऊंड अन् परिसर स्वच्छ दिसतो.

वीसएक पायऱ्या चढून गेल्यावर मंदिरात प्रवेश करताना मन जसे शांत होते तसे या मंदिराच्या आवारात आल्यावर होते. मंदिराचा समोरचा सभामंडपाचा शिल्लक भाग सध्या अठरा खांबांवर उभा आहे. येथे जाण्यासाठी पाच पायऱ्या चढाव्या लागतात म्हणजे आपल्यातील अहंकार, मत्सर, लोभ, मोह अन् आपल्यातील आपण या पायऱ्यांवर ठेऊन समामंडपात प्रवेश करायचा. पायऱ्यांना लागून असलेल्या पहिल्याच स्तंभावर आपल्याकडे पाहत असलेली नाजूक कोरीव कामाने नटलेली नर्तिकेची मूर्ती आपल्या एका हाताचे बोट ओठांवर ठेऊन फक्त शांत राहून मंदिराचा अनुभव घ्या, असे सांगताना दिसते. तर तिच्या शेजारी चांगल्या गोष्टींची सुरूवात आपण ज्याने करतो, असा श्रीगणेश खांबावरील मनोहारी रूपाने आपल्या मनात उरलासुरला मळभ गळून पडतो. मंडपातील खांबांवरील शिल्पवैभव समोरासमोर सजलेल्या दोन देवळ्या व त्यावरील नक्षीकाम तसेच नर्तिकी अन् हत्तींचा नक्षीकामातील वापर आपल्याला मोहात पाडतो. अदभूत सुंदर नक्षीकाम व स्त्रीसौंदर्याने सजलेल्या मूर्तींचा सोहळा द्वारशाखेवर बहरलेला दिसतो. ही द्वारशाखा आपल्याला गर्भगृहात खेचून नेते. या हेमाडपंती मंदिरातील हा गर्भगृह म्हणजे खरे तर सभामंडप आहे. हा सभामंडप पंचवीसहून अधिक खांबांनी पेलला आहे. आयताकृती छत सपाट आहे. येथे फक्त दरवाज्याच्या अगदी समोर एक लहानशी देवळी आहे याशिवाय आत काहीच नाही. मात्र शांत उभे राहिल्यावर देवळीसमोर एखादा प्रगाढ बुद्धिवंत खांबांचा आधार बसलेल्या दहा-वीस शिष्यांना धर्म अन् मानवजातीच्या उधारासाठी मार्गदर्शन करतोय, असे वाटायला लागते. आतील खांब गोल, चौकोनी आकाराचे मिश्र आहेत व त्याच्या वरच्या बाजूला उलट्या नागाचा फणा आहे. आतील नीरव शांतता अनुभवून शेजारच्या छोट्या मंदिरात यावे. ही खोली मंदिराचा गाभारा असल्यासारखे वाटते. येथे पूर्वी महादेवाची पिंड होती, असे पुजारी सांगतात. सध्या येथे पिंड नाही. मंदिराच्या गर्भग्रहाच्या छतावर कमळाच्या फुलांची नक्षी आहे. मंदिराला ग्रामस्थ शिवमंदिर मानतात. मात्र हा भुयाराचा मार्ग होता. तो आता बंद करण्यात आला आहे. येथून अंकाई किल्ल्यावर तर देवनदीकडे निघता येत होते, असे ग्रामस्थ सांगतात. हे बदल कालांतराने झाले असावेत. त्यामुळे पुरातत्त्व विभागही मंदिर शिवमंदिर असल्याचे न म्हणता हिंदू मंदिर अशी नोंद केलेली दिसते. मंदिराला शिखर नाही. शिखरावर गेल्यावर मंदिरातील आतील रचनाही वरून पाहता येते. तसेच पावसाचे पाणी छतावर साठून राहू नये म्हणूनही हेमाद्रीने याचा विचार केल्याचे दिसते. मंदिराच्या तीन बाजू सपाट दगडाच्या आहेत त्यावर हलके नक्षीकाम केलेले दिसते. कालांतराच्या पाऊसपाण्याने ही नक्षीपुसट झाली आहे. या मंदिराभोवती कोट असल्याचे पहायला मिळते. मंदिराच्या कोटाच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ दोन खांबांचे अवशेष पडलेले दिसतात. यावरून कोटाचा दरवाजाही सुंदर असेल याची कल्पना येते. त्यामुळे अपसूकच त्या अज्ञात कलाकारांचे कौतुक करावेसे वाटते. येथून अजिंठा, वेरूळ जवळच असल्याने मंदिर ही संकल्पना जेव्हा अस्तित्वात यायला सुरूवात झाली होती. त्या पहिल्या टप्प्यातील ही वास्तू घडविली गेली असेल, असे वाटते. डोळ्यांचे पारणे फेडणारे शिल्पसौंदर्य अन् वास्तूरचना अनुभवली म्हणजे देवठाणचा प्रवास संपला असे नाही. तर जगन खिल्लारे हे गावातील एक ज्येष्ठ आपल्याला मंदिराबरोबरच गावचीही सफर घडवून आणतात. कधी देवठाण पहायला गेलात, तर एखाद्या गाईडप्रमाणे ते आपलं गाव आपुलकीनं सर्वांना दाखविताना दिसतात.
देवठाणच्या हेमाडपंती मंदिराच्या टेकडावरून गावाकडे पाहिले, की समोर देवनदी व त्याअवतीभवती वसलेले देवठाण आता अगदी लहान वाटतं. पण तेव्हा देवठाण हे बाजारपेठेचे ठिकाण होतं. कारण पूर्वी देवठाणच्या बाजारपेठेत घोड्यांची खरेदीविक्री मोठ्या प्रमाणात चालत असल्याने देवठाणला ‘घोड्यांचं देवठाण’ म्हटले जायचे, अशी नोंदही पुरातत्त्व खात्याकडे असल्याचे गावकरी सांगतात. बाराबलुतेदारांचं हे गाव आजूबाजूच्या गावांसाठी त्यावेळी आर्थिक राजधानी असणार; मात्र कालांतराने सर्वकाही बदललं. या छोट्या गावात हनुमान, खंडोबा, देवीचे मंदिर, बिरोबा व विठ्ठल-रुक्माईचे मंदिर आहे. विठ्ठल मंदिर व्यापारी कुटूंब आट्टल यांनी बांधून दिले आहे, असे ग्रामस्थ सांगतात. येथे एका महाराजांची मूर्ती व समाधीही आहे. ही वास्तू वाड्याची आठवण करून देते. गावात जैन समाजही पूर्वी होता. आता त्यांची जुनी घरे पहायला मिळतात. खंडोबा मंदिर हेदेखील गावचे एक वेगळेपण आहे. खंडोबा मंदिराला कोट आहे. कोटाला सुंदर दगडी प्रवेशद्वार, मंदिरात मुख्य खंडोबा मंदिर असून, मंदिरात एका दगडावर खंडोबा व त्याच्या आजूबाजूला दोन मूर्ती आहेत, असे पुजारी सांगतात. मंदिराच्या आवारात समाधी व समोर वैशिष्ट्यपूर्ण दीपमाळ व पिंड, लहान मोठ्या मूर्ती व वीरगळी आहेत. गोल आकाराच्या दीपमाळेच्या वास्तूत टोकापर्यंत जाता येते. दीपमाळेमागे सहा खांबावर आधारलेली
सहा कमानींची देखणी दगडी लहानशी वास्तू आहे. जवळच गोल आकारातील अवाढव्य चुन्याच्या घाण्याचा मोठा दगड पाहिला की, दगडाच्या वास्तू कशा साकारल्या असतील याची लगबग डोळ्यापुढे दृष्य बनून दिसू लागतात. गावात दगडी बांधणीची बारवही होती; मात्र ती बुजली आहे. ही बारव पुन्हा मोकळी करून गावाला तिच्या पाण्याचा चांगला उपयोग होऊ शकतो. याकडे लक्ष देण्याची गरज आहे. गावात लक्ष्मीची यात्रा होते. पूर्वी यात्रेत सोंगांचा कार्यक्रम व्हायचा. मात्र सोंग नाचविणे आता बंद झाले असून, यात्रेत आता तमाशा होतो. गावात मल्लांची देखील परंपरा होती. मात्र आता तीही नाही. हेमाडपंती मंदिरामुळे सुंदर भासणारं गाव हीच गावची मुख्य ओळख सध्या आहे.
लेणीकडून मंदिराच्या दिशेने आकाराला आलेला काळ, मठ परंपरा, मंदिराचा उद्देश अन् नंतरच्या काळात बदलत गेलेली मंदिरे अन् त्यांचा उद्देश यासर्वांचा अनुभव घ्यायचा असेल तर देवठाण पहायलाच हवं. शिल्पसौंदर्याचा खजिना असलेले देवठाण आपल्याला एका दिवसाच्या या सहलीत हजार वर्षांचा प्रवास घडवितो, हे काही कमी नाही.
कसे जावे?
नाशिकहून औरंगाबाद एसटीने गेल्यास देवठाण चौफुलीवर उतरून दोन किलोमीटर चालत जावे लागते.
काय पहावे?
देवठाण येथील हेमाडपंती मंदिर मुख्य आकर्षण आहे.
खंडोबा मंदिर व तेथील दीपमाठ आकर्षक आहे.
खासगी गाडी असल्यास देवठाण बरोबरच येवला व चिचोंडीची सफरही करता येईल.
खुसखुशीत करंजी
नाशिकच्या मातीला धैर्य अन् शौर्याचा गंध आहे. म्हणून नाशिकला देवभूमी व तपोभूमीबरोबर वीरांची भूमीही म्हटले जाते. अनेक लढायांपासून लढ्यांचे साक्षीदार असलेली ही भूमी विकासभूमी म्हणूनही ओळखली गेली. या भूमीने अनेक घराण्यांना अडचणीच्या काळात समाजधुरीण राजे दिले. फक्त राजेच नाहीत तर त्या राजांच्या कारकिर्दीने नाशिकच्या शिरपेचात मोरपंख फुलविले. नाशिकच्या एका खेडेगावात जन्मलेला अन् होळकर घराण्याच्या गादीवर बसलेल्या एका महाराजाने तर मध्य प्रदेशात रेल्वे विकसित करून विकासगंगा प्रवाहित केली अन् होळकर घराण्याला वैभव मिळवून दिले. अशा ऐतिहासिक पैलूंनी सजलेले या महाराजांचे जन्मस्थान असलेली करंजी हे गाव पाहताना मनात वसलेली ही करंजी खुसखुशीत झाल्यासारखी वाटते.
नाशिकच्या प्रत्येक गावाचे काहीतरी वेगळेपण आहे अन् हाच वेगळेपणा पर्यटकांना त्या गावात जायला प्रेरीत करतो. नाशिक¬-औरंगाबाद रस्त्यावर तीस किलोमीटरवर चांदोरी फाट्याहून उजवीकडे सायखेडा हे गाव लागते. सायखेड्याहून साधारण २५ किलोमिटरवर गेल्यावर गोदाकाठी वसलेले करंजी खुर्द या गावात जाता येते. ज्ञात-अज्ञात अन् खुसखुशीत ऐतिहासिक पैलूंनी करंजी हे गाव ओळखले जाते. गावचे नाव करंजी कसे पडले हे ग्रामस्थांना माहीत नसले तरी ऐतिहासिक पाऊलखुणांनी करंजी खुसखुशीत झालेली दिसते. करंजीची एक वेगळी ओळख म्हणजे होळकरांची करंजी. करंजी हे अवघ्या दोनशे-अडीचशे उंबऱ्यांचे लहानसे गाव आहे. पण त्याचा इतिहास एका ऐतिहासिक घडामोडीशी जोडला गेला आहे.
१८ व्या शतकात होळकर घराण्याने पराक्रमाच्या जोरावर मराठा सैन्यात महत्त्वाचे स्थान मिळविले होते. त्यामुळे पेशव्यांनी त्यांना इंदूर येथील संस्थान बहाल केले. मल्हारराव होळकरांच्या पराक्रमांनी सुरू झालेली शौर्याची परंपरा पुढे फार कमी पहायला मिळाली. अहिल्याबाई होळकरांचा नाशिकशी जवळचा संबंध आला. होळकर राजघराण्याला पंधरा राज्यकर्ते मिळाले. काही अल्पायुषी तर काही फक्त नावापुरते राजे ठरले. यशवंतराव होळकरांनंतर त्यांची विधवा पत्नी कृष्णाबाईंना ऊर्फ केसरबाईंना होळकर घराणे पुढे घेऊन जाण्यासाठी दत्तक पुत्र हवा होता. तेव्हा त्यांनी नाशिकजवळच्या निफाड तालुक्यातील करंजी गावातील गंधारे-करंजीकर कुटुंबातील एक मुलगा होळकर घराण्यासाठी गादीवर बसण्यासाठी निवडला. हा मुलगा म्हणजे मल्हार (मल्हारराव होळकर नव्हे.). मल्हारचा जन्म करंजीत ३ मे १८३५ मध्ये झाला होता.
कृष्णाबाईंनी त्याचे नामकरण तुकोजीराजे (द्वितीय) असे केले. मल्हार वयाच्या दहाव्या वर्षापर्यंत करंजीतच वाढला होता. गंधारे कुटुंब करंजीतील मोठे प्रस्थ असावे. कारण त्यांचा वाडा होता. यावरून गंधारे आणि होळकर कुटुंबात काहीतरी संबंध आला असावा. यामुळेच गंधारे कुटुंबीयांच्या ध्यानीमनी नसताना मल्हार म्हणजे तुकोजीराजे (द्वितीय) होळकर घराण्याचे अकरावे राजे म्हणून १७ जून १८४४ रोजी गादीवर बसले. यशवंतरावांनंतर सातवे मल्हारराव (द्वितीय), आठवे मार्तंडराव, नववे हरीराव व दहावे खंडेराव हे राजे अगदीच अल्पायुषी ठरले. तुकोजीरावांनी मात्र आपला राज्यकाळ सर्वांगीण गाजवला. विकासात्मक सुवर्णकाळ म्हणून होळकर घराण्यात पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांनंतर करंजीच्या तुकोजीराव होळकरांचे नाव घेतले जाते. मात्र त्यांच्या कामगिरीची ओळख फारशी करंजीकरांनाही नाही अन् नाशिककरांनाही नसल्याचे दिसते.
एका संस्मरणीय कारकिर्दीचा शिल्पकार असलेल्या तुकोजीराव होळकरांनी इंदूरची गादी बेचाळीस वर्ष उत्तम राज्य कारभार करीत विकासपुरूषाची कर्तव्ये पारपाडीत सांभाळली. इंग्रजांच्या वर्चस्वाच्या काळात तुकोजीरावांनी समतोल राखीत इंदूर तसेच मध्य प्रदेशात अनेक विकासकामे केली. यात मध्यप्रदेशात रेल्वेची सुविधा निर्माण केली. रोजगार निर्मितीसाठी कापडगिरण्या सुरू केल्या. टपाल व्यवस्था, आरोग्यकेंद, दवाखाने, इंजिनियरींग कॉलेजेस, तसेच वन व महसुल विभाग सुरू केले. त्यांनी वर्तमानपत्रही सुरू केले होते. तुकोजीरावांच्या नावाने त्यावेळी नाणीही होती. इंग्रजांना सतावत ठेवण्यासाठी त्यांनी देशाच्या स्वातंत्र्यासाठी लढणाऱ्या क्रांतीकारकांनाही मदत दिली. इंदूर संस्थानाचे राष्ट्रगीत म्हणण्याची प्रथा त्यांनी इंदूर संस्थानातंर्गत येणाऱ्या व्यवस्थेत रूढ केली. म्हणूनच तुकोजी (द्वितीय) यांचा कार्यकाळ होळकर घराण्यातला श्रेष्ठकाळ मानला जातो. वयाच्या ५१ व्या वर्षी १७ जून १८८६ मध्ये त्यांचे निधन झाले.
महाराज तुकोजीराव होळकरांच्या जन्मस्थानाचे स्मृतीत राहिलेले ते घर अजूनही करंजीकर उत्साहाने दाखवितात. मल्हार म्हणजेच तुकोजीरावांचे घर जेथे होते तेथे आता दगडी बांधणीचे एक महादेव मंदिर अन् दगडी बांधणीची धर्मशाळा तेवढी आहे. दोन्ही वास्तू सुंदर आहेत. तुकोजीराव होळकरांचा मुलगा शिवाजी होळकर वडिलांच्या निधनानंतर १९०२ मध्ये त्यांच्या जन्मगावी म्हणजे करंजीत आला होता, अशी आठवण आपल्या वाडवडिलांनी सांगितल्याचे करंजीकर सांगतात. तेव्हा त्याने तुकोजीरावांचा जुना पडका वाडा पाडून तेथे मंदिर व धर्मशाळा उभारली अन् या मंदिराचे नाव तुकेश्वर महादेव मंदिर असे ठेवले. उंच दगडी पाटावर बांधलेले हे मंदिर देखणे असून, मंदिराच्या दरवाजा जवळच्या लाकडी चौकटींवरचं सुंदर नक्षीकाम आहे. मंदिराला रंगकाम केल्याने ते अजूनही आकर्षक वाटते.
मंदिराच्या गाभाऱ्यात होळकर घराण्याचं दैवत म्हणजेच शिवशंकराची पिंड अन् भिंतीत गणपती मूर्ती आहे. येथे तुकोजींच्या जन्मदात्या आईवडिलांच्या सुंदर अशा संगमरवरी मूर्तीही आहेत. तुकोजींचे वडील गंधारे अगदी ऐटीत आपल्या पूर्ण पगडीपोशाखात हातात तलवार घेऊन बसलेली मूर्ती अन् आईच्या मांडीवर बसलेला बाळ मल्हार या मूर्ती पहायला मिळतात. या मूर्तीच्या वर मल्हारला दत्तक घेणाऱ्या कृष्णाबाईंची मूर्ती आहे. यातून करंजी अन् होळकर घराण्याचा इतिहास अख्यायिका स्वरूपात कायम जिवंत राहावा, असा प्रयत्न केलेला दिसतो. कारण ही माहिती देणारा एकही फलक अथवा करंजीकर मिळत नाही. परिसरातील मारूती, शनी, गोदातीरावर स्वयंभू महादेव मंदिर आहेत.
तुकेश्वर मंदिराच्या देखभाल आणि पूजेसाठी इंदूरहून वर्षासन म्हणून ३०० रूपये यायचे. यातील ६० रूपये पूजापाठासाठी ब्राम्हणाला, ३० रूपये झाडझुड करण्यासाठी गुरवाला, उरलेली रक्कम महाशिवरात्रीला गाव जेवणासाठी अशी या वर्षासनाची तरतूद असायची. मात्र गेल्या ४०-४५ वर्षांपासून इंदूर संस्थानाकडून वर्षासन येण्यास बंद झाल्याचे पुजारी विजय जोशी सांगतात. ही प्रथा बंद पडल्याने मंदिर परिसरही बकाल झाला आहे. मात्र तुकोजीराव यांची ३ मे रोजी जयंती व १७ जून रोजी पुण्यतिथी साजरी करायला ग्रामस्थ विसरत नाहीत. गावात मातीची जुनी घरे अन् लाकडीकाम पाहण्यासारखे आहे. ही घरेही आता कात टाकत आहेत. गोदातीरावर सजलेला दगडी चिऱ्यांचा घाट होळकरांची आठवण करून देतो.
होळकर घराण्याचा नाशिकशी जवळचा संबंध आला असून त्यात लक्षात राहते ती अहिल्यादेवी होळकर यांची कारकिर्द आणि तुकोजीराव होळकर (तृतीय) यांचा अंतरजातीय प्रेमविवाह. महाराजा तुकोजीराव होळकर (तिसरे) यांना नॅन्सी अॅन मिलर यांच्याशी प्रेमविवाह करायचा होता. या आंतरवांशिक विवाहाने जगभरातील प्रसारमाध्यमांचे लक्ष वेधले. १३ मार्च १९२८ रोजी नाशिक येथे डॉ. कुर्तकोटी शंकराचार्य यांनी मिस मिलर यांना हिंदू धर्माची दीक्षा दिली व लंभाते कुटुंबीयांनी तिला दत्तक घेऊन त्यांना धनगर करून घेतले व त्या नॅन्सी अॅन मिलरच्या शर्मिष्ठादेवी होळकर बनल्या. पण यात तुकोजीराव होळकर (दुसरे) या नाशिककर असलेल्या होळकर राजाची कारकिर्द मात्र झाकोळली गेली. करंजीकर अजूनही होळकरांचे करंजी असे म्हणवून घ्यायला उत्सुक असतात अन् एका करंजीकराने इंदूरचे संस्थान चालविले हा अभिमानही उराशी बाळगतात. अशा खुसखुशीत इतिहासाने करंजी अधिक खुसखुशीत झालेली दिसते.
मध्यमेश्वर मंदिर आणि बानेश्वर मंदिर खानगाव थडी
नाशिक जिल्ह्यातील निफाड तालुक्यात पक्षी अभयारण्यासाठी प्रसिद्ध असलेले ‘नांदूर मध्यमेश्वर’ हे गाव गोदावरी नदीच्या तीरावर वसले आहे. नांदूर मध्यमेश्वर बंधाऱ्याच्या उथळ पाणथळ क्षेत्रामुळे. या बंधाऱ्याच्या खाली खानगाव थडी भागात गोदावरी नदीचे विस्तीर्ण असे पात्र आहे. दक्षिणेतील गंगा म्हणून मान्यता असलेली गोदावरी नदी आणि एकीकडून येणारी कादवा नदी यांच्या संगमावर लांबच लांब बांधलेल्या ब्रिटीशकालीन बंधाऱ्याला नंतरच्या काळात पाण्याचे नियंत्रण करण्याच्या दृष्टीने दोन बाजूला धरण बांधून गेट बसविण्यात आले आहेत. या बंधाऱ्यासमोरील भागात संपूर्ण नदी पत्रात खडक असल्याने नदीचे दोन प्रवाह निर्माण झालेले आहेत. या दोन प्रवाहाच्या मधील भागातील उंच भागावर मध्यमेश्वर शिव मंदिर आहे. या शिव मंदिराच्या नावावरूनच येथील पक्षी अभयारण्याला नांदूर मध्यमेश्वर असे नाव मिळालेले आहे.सायखेडामार्गे निफाड तालुक्यातील खानगावथडीला जाता येते. तेथून पुढे ‘नांदूर मध्यमेश्वर’ हे गाव लागते. हा परिसर अश्मयुगातील पुरातन लोकवस्तीचा होता, हे येथे झालेल्या पुरातत्त्वीय उत्खननातून स्पष्ट झाले आहे. खानगावथडीतून ‘नांदूर मध्यमेश्वर’ बंधाऱ्याच्या रस्त्याने नांदूर मध्यमेश्वर गावात जाता येते. धरणाच्या बॅकवॉटर परिसरात संगमेश्वर, तर धरणाच्या खाली गोदावरी नदी तीरावर चक्रधर स्वामींनी वास्तव्य केलेले गंगामध्यमेश्वर शिव मंदिर आहे. नांदूर मध्यमेश्वर या गावातून या मंदिरात जायचे झाल्यास नदीपात्रातून जावे लागते. पावसाळ्याच्या दिवसांत या नदीपात्रात ३ ते ४ फूट वाहते पाणी असते. मात्र पावसाळ्याव्यतिरिक्त इतर वेळी या नदीपात्रातून सहज पायी जाता येते. याशिवाय खानगावात येऊन बंधाऱ्यावर न जाता त्याखालील उजवीकडील नदीपात्रातील रस्त्याने श्री गंगामध्यमेश्वर मंदिराकडे जाता येते.
पूर्वमुखी असलेल्या या मंदिराच्या प्रवेशद्वारा समोरच छत नसलेली हनुमानाची मूर्ती आहे. प्रवेशव्दारातून आत गेलो कि उजव्या हाताला उंच मिनार असून तो अलीकडे बांधलेला वाटतो. मंदिराच्या समोरच दिसतो तो पाषाणात कोरलेला भव्य नंदी, या नंदीवर सुद्धा पूर्वी छत नसावे, ते अलीकडे बांधलेले आहे. कोरीव चौकट असलेल्या प्रवेशव्दारातून प्रवेश केला की प्रथम लागतो तो कमानी असलेला सभामंडप. सभामंडपात चक्रधर स्वामींचे आसनस्थान आहे. असे सांगितले जाते की, या मंदिरात काही काळ चक्रधर स्वामी वास्तव्यास होते. सभामंडपाच्या पुढे अर्धमंडप असून त्यापुढे गर्भगृह आहे. उंच शिखर असलेल्या गर्भगृहात पायऱ्या उतरून जावे लागते. मध्यात भव्य असे शिवलिंग आहे. या शिवलिंगास पितळेने मढविलेले आहे.या गोलाकृती शिवलिंगावर चारही बाजूने मुखवटा कोरलेला आहे.
परकोटाच्या आत फरसबंद भव्य पटांगण असून या ठिकाणी काही नव्याने बांधलेली मंदिरे आहेत. मंदिराभोवती प्रशस्त पटांगण असून तेथे एक तुळशी वृंदावन व छोटे मंदिर आहे. मंदिराच्या आतील भागाप्रमाणेच मंदिराबाहेरील बाजूवरही फुलांची नक्षी कोरलेली पाहायला मिळते. संपूर्ण मंदिराला प्रदक्षिणा केली असता मंदिर प्राचीन असल्याचे लक्षात येते मात्र शिखरा जवळील मिनार नवीन बांधलेली वाटतात. मंदिर परिसरातून गोदावरी नदीचे विशाल पात्र दिसते गोदावरी नदीच्या दोन्ही तटांवर अनेक प्राचीन मंदिरे आहेत. मात्र, हे मंदिर गोदावरी नदीच्या पात्रात मधोमध असल्याने त्याचे वेगळेपण उठून दिसते.
गोदावरीच्या उजव्या प्रवाहाच्या किनारी पौराणिक संदर्भ लाभलेले आणखी एक प्राचीन असे मंदिर आहे. रामायण काळात, प्रभू श्रीराम वनवासात जात असतांना मार्गक्रमण करीत असतांना वाटेवर शिवमंदिर लागले. जेव्हा श्री रामाने मारिच राक्षसाला येथूनच बाण मारला अशी मान्यता आहे त्यामुळे या शिव मंदिराची ओळख बाणेश्वर शिवमंदिर अशी झाली. हे बाणेश्वर शिवमंदिर अगदी खानगाव थडी गावातील निसर्ग निर्वाचन केंद्राजवळच आहे. या परिसरात आणखी काही मंदिरे असून काही प्राचीन अशा पाषाणातील मूर्ती आणि शिल्प विखुरलेली दिसतात. गोदावरीच्या दोन तीरावर ही दोन्ही प्राचीन मंदिरे भेट द्यावी अशीच आहेत. नांदूर मध्यमेश्वर पक्षी अभयारण्यास भेट देत असतांना या प्राचीन मंदिरांना सहज भेट देता येते. प्रत्येक श्रावणी सोमवारी व महाशिवरात्रीला मंदिरात उत्सव होतो. यावेळी भाविकांची येथे गर्दी होते. सकाळी ५ ते सायंकाळी ६ या वेळेत मंदिरात जाऊन मध्यमेश्वर म्हणजेच महादेवाचे दर्शन घेता येते.
या परिसरात असलेल्या डावीकडील नदीप्रवाहात कुंभार पाकोळी पक्ष्यांचे हजारो घरटी असलेली जागा आहे. या ठिकाणी पक्षी निरीक्षक या पक्ष्यांचा सायंकाळी घरट्याकडे परतणारा थवा बघण्यासाठी येत असतात.
उपयुक्त माहिती:
नाशिकपासून ५० किमी, तर निफाडपासून ११ किमी अंतरावर
नांदूर मध्यमेश्वर व खानगावथडीसाठी एसटीची सुविधा
खासगी वाहने नांदूर मध्यमेश्वर व खानगावथडी येथे ठेवता येतात
गोदावरी नदीच्या पात्रातून पायी जावे लागते
मंदिर परिसरात निवास व न्याहरीची सुविधा नाही
मृगव्याधेश्वर मंदिर,
नांदूर मध्यमेश्वर, ता. निफाड, जि. नाशिक

उपयुक्त माहिती:
- नाशिकहून ५० किमी, तर निफाड शहरापासून १० किमी अंतरावर
- निफाड रेल्वे स्थानकापासून १५ किमी
- नांदूर मध्यमेश्वरसाठी निफाडहून एसटीची सुविधा
- खासगी वाहने थेट मंदिरापर्यंत जाऊ शकतात
- मंदिर परिसरात निवास व न्याहरीची सुविधा नाही
मोरोपंत पिंगळेंचे वडगाव पिंगळा
वडगाव पिंगळा या गावाची माहिती घेण्यापुत्वी प्रथम मोरोपंत पिंगळे यांची माहिती घेउया.छत्रपती शिवाजी महाराजांचे एक प्रमुख सरदार अन् मराठा दौलतीचे पंतप्रधान म्हणून प्रसिद्ध असलेले मोरोपंत पिंगळे एक अनोखे ऐतिहासिक व्यक्तिमत्त्व. इ. स. १६६६ मध्ये छत्रपती शिवाजी महाराज आग्र्यास निघाले तेव्हा ज्या तीन गृहस्थांच्या हाती छत्रपतींनी आपल्या राज्य कारभाराची सर्व सूत्रे सोपविली त्यात मोरोपंत हे मुख्य होते. पुढे १६७० च्या सुमारास छत्रपती शिवाजी महाराजांनी मोरोपंत व प्रतापराव गुजर यांना साल्हेरच्या कुमकेकरिता वीस हजार फौज देऊन रवाना केले. यावेळी त्यांनी साल्हेरजवळ मोगलांचा सरदार इखलासखान याच्या सैन्यावर मोठा विजय मिळवून शत्रूवर मात केली. सुरत लूट सुरक्षितरित्या राजगडावर नेण्यात मराठ्यांना यश आलेच. पण इतक्यावर ते थांबले नाहीत. शिवरायांनी पंतप्रधान मोरोपंत पिंगळे यांना त्रिंबक, औंढा, पट्टा, रावळ्या-जावळ्या हा नाशिक आसपासचा संपूर्ण भाग काबीज करण्याच्या कामगिरीवर पाठवले होते आणि खुद्द शिवरायही खानदेश भागात शिरले होते.
१६७९ ला जालना लुटून आल्यावर पट्टा किल्ल्याच्या आसपास मोंगलांचे जे २७ किल्ले होते त्यातील शक्य तेवढे काबीज करून घेण्याकरिता छत्रपतींनी पंतांची रवानगी केली. पंतांनी ते किल्ले घेऊन सर्व खानदेशवर पकड मिळविली. छत्रपती शिवाजी महाराजांच्या मृत्यूनंतर (१६८०) प्रथम मोरोपंत सोयराबाईंच्या पक्षास मिळाले. म्हणून त्यांना संभाजी महाराजांनी बंदीत ठेवले. परंतु पुढे मोरोपंत छत्रपती संभाजींच्या पक्षास जाऊन मिळाल्याने त्यांना पेशवाईच्या जागी कायम करण्यात आले. मात्र सहा महिन्यातच त्यांचा मृत्यू झाला. असे म्हटले जाते, की शिवाजी महाराजांचे हेतू व धोरणे मोरोपंतांना चांगले माहिती असल्याने त्यांच्या हातून विलक्षण पराक्रम घडला. युद्धशास्त्र व राज्य कारभारात मोरोपंत तरबेज होते, असे काही उल्लेख मराठा रियासतीत व इतिहासांच्या पानांमध्ये मिळतात. यातून मोरोपंत पिंगळ्यांची कारर्कीद समोर येते. त्यांचा नाशिकशी संबंधही या लढाय्यांदरम्यान समोर येतो. याच उलाढालीच्या दरम्यान मोरोपंत पिंगळेंचे वास्तव्य वडगाव पिंगळा असावे ही माहिती समोर आल्याने या गावाकडे पाहण्याचा नूरच पालटून जातो. इतिहासाला आपल्या नावातून पुढे घेऊन जात असलेल्या वडगाव पिंगळामध्ये आज मोरोपंतांच्या इतिहासाच्या खाणाखुणा शोधूनही सापडत नाहीत.
नाशिक-सिन्नर रस्त्यावर दारणा ओलांडून पुढे शिंदे गावातील उड्डाणपुलाच्या बोगद्यातून उजव्या हाताला नाशिक साखर कारखान्याकडे जाणा-या रस्त्याने आत गेल्यावर साखर कारखान्यापूर्वी डाव्या हाताने वडगाव पिंगळा या गावाकडे जाता येते. वडगाव पिंगळा हे गाव म्हणजे ताम्रपटातील वदगंभा म्हणजे वडगाव पिंगळा. वडगावला पिंगळा हे उपनाव शिवकाळात लागले. छत्रपती शिवाजी महाराजांचे पंतप्रधान मोरोपंत पिंगळे खानदेशातील मोहिमांदरम्यान वडगावात गढी बांधून राहिले म्हणून वडगावला पिंगळ्यांचे वडगाव म्हणून ओळखले जाऊ लागले. वडगाव पिंगळ्यातही यादवकालीन मंदिर होते. याचे अवशेष आजही हनुमान मंदिराभवती पहायला मिळतात.

जाम गावातील हनुमान मंदिर
गावात प्रवेश केल्यावर डाव्या हाताला हनुमानाचे मंदिर लागते. मंदिराचा सभामंडप नव्याने बांधलेला आहे; मात्र मूळ मंदिराच्या प्रवेद्वारावरील लाकडावर कोरलेली सुंदर नक्षी व त्यावरील रंगकाम आपल्याला आकर्षित करते. मंदिरातील सभागृह व तेथील लाकडावरील कोरीव काम, मलखांब खेळणारा मल्ल, श्रीकृष्ण व सेवकांच्या लाकडी मूर्ती व दोन मजली मंदिरातील लाकडी छत्राचे नक्षीकाम मनमोहून टाकते. गावात हनुमानाची यात्रा भरते. यात्रेत पूर्वी बोहाडा व्हायचा. मात्र २५ वर्षांपासून ही परंपराही बंद झाली आहे. हनुमान मंदिरात बसलेले ज्येष्ठ मंडळी गावाच्या नावाबाबत एक वेगळीच माहिती उलगडतात. गावचे नाव वडगाव असे होते. त्याला पिंगळा हे नाव लागण्यामागे गावाला मोरोपंत पिंगळ्यांचा सहवास लाभल्याचे गावकरी सांगतात. याबाबत इतिहासात नोंदी नसली तरी वडगाव पिंगळातील ग्रामस्थ गावात मोरोपंतांची गढी असल्याने तसेच पिंगळ्यांची अनेक कुटुंब येथे राहत असल्याने गावाला पिंगळ्यांचे वडगाव म्हणता म्हणता वडगाव पिंगळा असे नाव पडल्याचे सांगतात.

पिंगळे आडनावाचे आता गावात कोणी नाही; मात्र मोरोपंतांच्या आठवणी गावाच्या नावातून आजही ताज्या आहेत. म्हणूनच की काय नाशिकच्या नवरत्नांमध्ये मोरोपंत पिंगळे यांचे नाव घेतले जाते. हे गाव मोरोपंत पिंगळ्यांना जहागिरीत मिळाले असावे का? याबाबत मात्र कोणतीही नोंद आता मिळत नाही. गावात पिंगळ्यांची मोठी गढी होती. मात्र आता ती नाममात्रही दिसत नाही. त्या जागेवर आता घरे वसल्याने खाणाखुणाही मिळत नाहीत. फक्त गढीच्या तुटकतुटक आठवणी ज्येष्ठ मंडळी सांगतात. गावात शनी मंदिर, शिवमंदिर, विठ्ठल-रुख्मिणी आदी मंदिरे आहेत. अहिल्याबाईंच्या बारवेचा पायऱ्यांचा विस्तार बुजवून फक्त आता विहीर जाम रस्त्यावर दिसते.
यादवकालीन शिंदे, चिंचोली

जिनप्रभसूरी यांच्या साधारण अकराव्या शतकातील तीर्थकल्प या ग्रंथात ‘नासिक्यकल्प’ या प्रकरणात अंजनेरीच्या श्रीचंद्रप्रभ तीर्थंकराच्या स्थान माहात्म्याबद्दल सांगताना जिनप्रभसुरी लिहितात, ‘दुर्वास ऋषीने द्वारावती (द्वारकानगरी) जाळल्यानंतर वज्रकुमार नावाच्या यादव क्षत्रियाची गर्भवती स्त्री जैन तीर्थंकर श्रीचंद्रप्रभ स्वामी यांना शरण आली. त्यांनी तिला आश्रय देऊन तिचे संरक्षण केले. तिला झालेला पुत्र दृढप्रहार म्हणून ओळखला जाऊ लागला. त्याने आपल्या पराक्रमाने तलारपय (तलवार पद म्हणजेत नगररक्षक) पदही मिळविले. अंजनेरीत यादव वंशाचे बीज रोवले गेले. दृढप्रहार पुढे राजा झाला व त्याने चंद्रप्रभस्वामींचे मंदिर बांधले.’ यादवांचा इतिहास हेमाद्रीने महादेवराय यादव यांच्या काळात (शके ११८२-११९३ म्हणजेच इ.स. १२६०-१२७१ ) या काळात लिहिलेल्या राजप्रशस्ती या ग्रंथातूनही समजतो. यात प्रथम राजा दृढप्रहारी (काळ अंदाजे इ.स.८५०) पासूनचा इतिहास दिला आहे. हेमाद्री दृढप्रहाराबद्दल लिहितो की, ‘द्वारकेचा राजा सुबाहू याला चार पुत्र होते आणि त्याने आपल्या राज्याचे चार भाग करून त्यांना वाटून दिले. त्यात दृढप्रहाराला दक्षिणेचे राज्य मिळाले.’ या दृढप्रहाराचा पुत्र सेऊणचंद्र याचे नाव येते. याबद्दल हेमाद्री राजप्रशस्ती ग्रंथातील २२ व्या श्लोकात म्हणतो की,
तत: स राजा निजराधानीमधिष्ठिता श्रीनगरंगगरय:।
लेभे सुतं सेऊणचंद्र नाम यत्संज्ञया सेऊनदेशमाहु:।।
श्रीनगर राजधानीतील सेऊणचंद्र राजाच्या नावावरून प्रदेशाला सेऊणदेश असे नाव पडल्याचे हेमाद्री सांगतो. सेऊणचंद्र प्रथम हा यादववंशातील महत्त्वाचा राजा दिसतो. यादवांचा इतिहास अनुभवायचा असेल तर अपरांत प्रकाशनच्या देवगिरीचे यादव हे ब्रह्मानंद देशपांडे यांचे पुस्तक नक्की वाचायला हवे. राष्ट्रकूट आणि गुर्जरप्रतिहार यांच्या कलहात त्याने राष्ट्रकूटांच्या बाजूने मोठा वाटा उचलला असावा याचे मुख्य कारण म्हणजे सेऊणचंद्राचे बलाढ्य सैन. सेऊणचंद्राकडे मोठे पायदळ असल्याचा उल्लेख इतिहासात मिळतो. त्यामुळेच दृढप्रहार हा यादववंशाचा संस्थापक मानला जात असला तरी सेऊणचंद्र हा वंशाला पुढे घेऊन जाणारा ठरला. मात्र तो वडील असलेल्या दृढप्रहारांना विसरलेला नाही. वसईच्या ताम्रपटात सेऊणचंद्र दृढप्रहाराच्या पराक्रमांचेही वर्णन करताना दिसतो. मात्र हा ताम्रपट नाशिककरांसाठी जवळचा ठरतो. कारण यात नाशिकच्या चार गावांचा उल्लेख आला आहे. एक हजार वर्षांपूर्वीच्या ताम्रपटातील ती चार गावे नेमकी आहेत, कुठे आहेत याचा शोध पाऊलखुणांच्या माध्यमातून घेतला अन् चक्क एक हजार वर्षांची सफर अनुभवायला मिळाली.
शिंदे गावातील प्राचीन तलाव
नाशिकहून सिन्नरकडे जाताना दारणा ओलांडून पुढे गेल्यावर डाव्या हाताला शिंदे (ता. नाशिक) हे गाव लागते. गावात शिरताच हनुमान मंदिर आहे. मंदिराचा गाभारा उतरविण्यात आला असून, त्याचे नव्याने बांधकाम सुरू आहे. ‘पूर्वी गावात सिंदीची झाडे खूप असतील म्हणून अथवा शिंदे नावाचा कोणीतरी गावात होऊन गेला असेल म्हणून गावाला शिंदे नाव पडले असावे.’ असे पांडूरंग सांगळे सांगतात. शिंदे गावात मारूती, महादेव, रेणुका देवी, खंडोबा, कान्होबा अशी अनेक मंदिरे आहेत. पेशवाईत गावात देशपांडेंचे अनेक वाडे होते; मात्र आता ते नाहीत. पूर्वी खंडोबाच्या यात्रेत बोहाडेही व्हायचे मात्र आता ते बंद होऊन पन्नास वर्ष झाली आहेत. गावात ७०-८० वर्षांपूर्वी मंदिरांची माहिती घेण्यासाठी इंग्रज आल्याची तोंडातोंडी आलेली आठवण ज्येष्ठ मंडळी सांगतात. गावाच्या परिसरात अनेक समाधीही होत्या. मात्र आता शहरीकरणाच्या गराड्यात त्या नामशेष झाल्या आहेत. मात्र शिंदे गाव चळवळींचे गाव म्हणूनही परिचित आहे. गावातून गोवा मुक्ती संग्राम, संयुक्त महाराष्ट्र लढा व इगतपुरीच्या भात लढ्यासह अनेक लढ्यांमध्ये मंडळींनी नाव कमावले आहे. यात रामचंद्रनाना भांगरे, पांडूरंग सांगळे, सहादू जाधव धोंडेराम जाधव, विठ्ठूबा जाधव व लक्ष्मण जाधव यांचे नाव आवर्जून घेतले जाते, आता गावात बघण्यासारखे एकच आकर्षण आहे तो म्हणजे दगडाचा हौद !
शिंदे गाव नाशिक-पुणे महामार्गामुळे विभागले आहे. रस्ता ओलांडून शिंदे गावातील ज्युनिअर कॉलेजच्या रस्त्याने सरळ हौद पाहण्यासाठी निघायचे. पुढे एक मैदान अन् नदीपात्राच्या कडेला नव्याने बांधलेले रेणुका माता मंदिर व शनी मंदिर दिसते. मंदिराबाहेर एक पिंड व त्यासमोर नंदी उघड्यावर ठेवलेले आहे.इथून पुढे कच्चा रस्ता असल्याने ‘गाडी तेथेच लावायची अन् तेथून दोन किलोमीटरवर एका लहानश्या टेकडीवर जायचे.चालत राहिले कि समोर एक टेकाड दिसते. दुमजली उंचीची टेकडी चढून गेल्यावर समोर दोन-तीन एकरातील दगडाच्या बांधणीतील बंदिस्त केलेला हौद.. हौद कसला प्राचीन तलाव आहे. तलावाच्या दोन बाजूच्या भिंती कोसळू लागल्या आहेत. हा तलाव नक्कीच यादवकालीन असणार यात शंका नव्हती. नंतरच्या काळात इंग्रजांनी वरच्या थरातील भिंत बांधल्याचेही स्पष्ट दिसत होते. आजूबाजूचे शेतकरी शेतीसाठी येथून पाणीही वापरतात.
पूर्वी या प्राचीन तलावाभवती गाव असावं. या तलावाला एका जुन्या नोंदीनुसार चिंचोली तलाव म्हटले गेले आहे. मात्र ग्रामपंचायत हद्दीनुसार हा तलाव आता शिंदे गावच्या हद्दीत आहे. तलावातून गावात पाणी वितरणाची व्यवस्था असल्याचेही तलावाच्या एका कोपऱ्यात पहायला मिळते. या प्राचीन तलावाची रचना यादवकाळीन कुंडासारखी असून, मध्यभागी गाळ साचला आहे. पुरातत्त्व व पाटबंधारे विभागाने हा तलाव संरक्षित करण्यासाठी प्रयत्न करायला हवे.
मोह गावः-
ताम्रपटातील महूय म्हणजे मोह व मोहदरी या गावात पोहचलो. दारणेच्या कुशीत विसावलेले मोह गाव दत्त मंदिरासाठी प्रसिद्ध आहे. गावातील हनुमान मंदिर एखाद्या वाड्यासारखे आहे. मंदिरामागे भिसेंचा चाळीसारखा वाडा आहे. मात्र आता तेथे कोणी राहत नाही. गावातातील एका टेकडीवर खंडेरायाचे दगडी बांधणीचे लहानसे मंदिर आहे. तसेच कानिफनाथांचे मंदिरही गावात आहेत. गावात पूर्वी खूप मोहाची झाडे असल्याने गावाला मोह असे नाव पडल्याचे गावकरी सांगतात.चिंचोलीतील प्राचीन मंदिर :-
वसईच्या ताम्रपटात उल्लेखलेले चौथे गाव म्हणजे मोह गावाच्या समोरील चिंचुली म्हणजे चिंचोली हे गाव. मोह गावातून नाशिक-सिन्नर महामार्गावर यायचे महामार्ग ओलांडून समोरच्या रस्त्याने चिंचोली गावाकडे निघायचे. गावात चिंचाची झाडे पूर्वी खूप होती म्हणून चिंचोली नाव पडले असेल, असे ज्येष्ठ मंडळी सांगतात. गावात प्रवेश केल्यावर आपण चिंचोलीच्या शाळेच्या पटांगणात पोहचतो. पटांगणात एका चौथाऱ्यावर काही दगडांना शेंदूर लावलेला व त्यावर व्यायामाचे दोन मुदगल ठेवल्याचे दिसते. ग्रामस्थ त्याला वेताळबाबा म्हणतात. गावातील हनुमान मंदिर व इतर लहान लहान मंदिरांची भटकंती झाली.
याशिवाय चिंचोली गावात मोठे वडाचे झाड आहे. रस्त्यात उजव्या हाताला दोन उभ्या शिळांवर कोरलेले दोन नाग दर्शन देतात. डाव्या हाताला असलेल्या वडाखाली मोठेबाबा विसावलेले आहेत. वडाच्या झाडानंतर डाव्याहाताला जाणारा रस्त्याने चार किलोमीटर कच्चा रस्ता (दुचाकी जावू शकते) आहे. या रस्त्याने थेट डोंगर भेटेपर्यंत चालत रहायचं. एका भेंडीच्या झाडाच्या मिठीत एक कातळ दडलेला दिसायला लागतो. दोघांनी एकमेकांना घट्ट मिठी मारली आहे. काळाने केलेले आघात सोसत हे भूमीज शैलीतील मंदिर फक्त गाभारा रूपाने उभं आहे. त्याचा देह आजूबाजूला विखुरलेला दिसतो. गाभाऱ्यात पिंड आणि नंदी आहेत. आजूबाजूला नक्षीकाम असलेले स्तंभ अन् अवशेष मनाला पीळ देतात. पण कौतुक कराव वाटतं ते त्या भेंडीच्या झाडाचं ज्यानं हजार वर्षांचा हा गाभारा अजूनही जपला आहे. ‘हे मंदिर पुन्हा आहे तसं उभं करता येईल का?’ हा प्रश्न समोर येतो कारण नाशिक जिल्ह्यात अशी तीनशेहून अधिक मंदिरे आहेत की जी जपण्याची गरज आहे. यासाठी कोण पुढाकार घेणार या प्रतीक्षेत अजूनही ही मंदिरे तग धरून उभी आहेत. त्या भग्न मंदिराशी संवाद साधताना तो पुन्हा यादवांचा पराक्रम सांगू लागतो आपलं दु:ख बाजूला ठेऊन. त्याला मानात साठवत परतीच्या मार्ग केव्हा संपतो हेच लक्षात येत नाही. पण मनाला एक प्रश्न सतावत राहतो.. ताम्रपटातील या प्राचीन गावांतील तलाव अन् मंदिर जपण्यासाठी आपण काही करणार आहोत का?
खडकवीरांचं धारणगाव
निफाड तालुक्यात साकारतेय देशातील दुसरे कामाख्या देवी मंदिर

प्राचीन महादेव मंदिर आणि शिलालेख (निमगाव मढ),येवला नाशिक
पिनाकेश्वर मंदिर, जातेगाव,
ता. नांदगाव, जि. नाशिक



उपयुक्त माहिती:
- नांदगावपासून ९० किमी, तर नाशिकपासून १०५ किमी अंतरावर
- डोंगराच्या पायथ्यापर्यंत नांदगावपासून एसटीची सुविधा
- खासगी वाहने थेट पिनाकेश्वर मंदिराच्या वाहनतळापर्यंत जाऊ शकतात
- परिसरात निवास व न्याहरीची सुविधा नाही
ताम्रपटातील चंद्राची मेट
कर्दमऋषींचं आंबेवणी
ब्रम्हदेवांच्या चार मानस पुत्रांपैकी महर्षी भृगू हे ज्येष्ठ पुत्र, दुसरे महर्षी अंगिरस, तिसरे महर्षी अत्रि आणि चौथे महर्षी वैखानस! महर्षी अत्रि आणि महर्षी अंगिरस यांना मानाचं स्थान थेट सप्तर्षींमधेही आहे.
ब्रह्मदेवाने सृष्टीची रचना व त्याच्या विस्तार करण्यासाठी कर्दम ऋषींची निर्मिती केल्याचे अनेक धार्मिक ग्रंथात म्हटले गेले आहे. ग्रंथांमधील उल्लेखानुसार, सृष्टीची रचना व विस्तार करण्यासाठी प्रत्यक्ष ब्रह्मदेवाने आपल्या सावलीपासून कर्दम ऋषींची निर्मिती केली. कर्दम ऋषींनी आपल्या योग्य विद्येच्या मदतीने जल, वायू, भूमी यावर उडणाऱ्या विमानाची रचना केली होती, असेही म्हटले जाते. कर्दम ऋषींच्या जन्माचा उद्देश आणि ब्रह्माकडून त्यांची निर्मिती केली गेल्याचे नारदाच्या तोंडून कौतुक ऐकल्याने मनु ऋषींना कर्दम ऋषींबद्दल खूप आकर्षण निर्माण झाले. त्यांनी स्वत: कर्दम ऋषींच्या आश्रमात जावून आपली कन्या देवहूतीशी लग्न करावे, असा प्रस्ताव ठेवला. कर्दम ऋषींनी मनुचा प्रस्ताव स्वीकारला व देवगणांच्या उपस्थितीत कर्दम ऋषींचं लग्न मनुची कन्या देवहूतीशी झाले. त्यांना नऊ मुली व एक मुलगा झाला. ब्रह्मदेवाने आपण स्वत: तुझ्या मुलाच्या रूपाने देवहूतीच्या गर्भातून जन्म घेऊ असा शब्द कर्दम ऋषींना दिला होता. म्हणून कर्दम ऋषींचा मुलगा कपिल ऋषींना विष्णुचा अवतार मानले जातात.
कर्दम ऋषींनी आपल्या सर्व कला, अनसूया, श्रद्धा, हविर्भू, गति, क्रिया, ख्याति, अरुंधती तथा शान्ति या मुलींचे लग्न क्रमश: मरीचि, अत्रि, अंगिरा, पुलस्त्य, पुलह, ऋतु, भृगु, वसिष्ठ तथा अथर्वा या देवांशी लावले. साक्षात् श्रीलक्ष्मीमातेचे पुत्र असलेल्या कर्दममुनी आणि देवाहुती यांची सुकन्या म्हणजेच महर्षी अत्रिंची पत्नी महासाध्वी माता अनसूया! अत्रिमुनींचं ज्ञान, तपःसामर्थ्य आणि वैराग्य पाहून कर्दममुनी-देवाहुतीही त्यांच्यावर प्रसन्न झाले आणि त्यांनी आपल्या अनसूया या सौंदर्यवती-सुशील कन्येचा अत्रिमुनींशी विवाह लावून दिला. 'अनसूया' म्हणजे 'असूयारहित'! अश्या या महान सती श्रीअनसूयेचं माहेर अर्थात् श्रीदत्तप्रभूंचं आजोळ (महर्षी कर्दममुनींचा आश्रम) आहे. त्रेतायुगात मार्गशिर्ष पौर्णिमेच्या भर माध्यान्ही, महर्षी अत्रि आणि महापतिव्रता साध्वी अनसूया यांच्या सुपुत्ररुपानं भगवान् श्रीदत्तात्रेयांनी अवतार धारण केला.
कपिल ऋषींनी आपली आई देवहूतीबरोबर कर्दम आश्रमात राहून आईकडून भक्ति-वैराग्याचे धडे गिरविले. देवहूतीनेही आश्रमात राहून गृहस्थाश्रम धर्माचा त्याग करून योगाच्या माध्यमातून अध्यात्म मार्गाची निवड केली. तर कपिल ऋषी कर्दमाश्रमातून ईशानकोण आश्रमात निघून गेले. तर दुसरीकडे अनसूया व अत्री यांना झालेला मुलगा पुढे दत्तात्रेय म्हणून परिचित झाला अन् त्यांचे पालनपोषण त्यांचे आजोबा कर्दम ऋषींच्या आश्रमातच झाले असावे. त्यामुळेच येथे दत्तात्रेयांचा प्रभाव दिसतो, त्यामुळेच नाशिकवर महानुभवपंथाचा प्रभाव घट्ट दिसतो. कर्दम ऋषींचा आश्रम म्हणून प्रसिद्ध असलेले दिंडोरी तालुक्यातील श्री क्षेत्र करंजी कर्दमऋषी आणि दत्तात्रेय प्रभूंच्या माहात्म्यातून अध्यात्मिक प्रवास घडविताना दिसते. हा प्रवास फक्त अध्यात्मिक नाही तर निसर्गसौंदर्य मनात फुलविणाराही ठरतो.

री दत्तप्रभूंचे आजोळ करंजी

करंजी देवस्थानातील पारंपरिक उत्सव व नियम

श्री दत्तप्रभूंची पद्मासनस्थित मूर्ती अन्यत्र कोठेही पहायला मिळत नाही व एकमेव भारतामधून इथे पहायला मूर्ती मिळते. प्रत्यक्ष गंगामाईनं श्रीदत्तप्रभूंची ही मूर्ती येथे तप केलेल्या श्रीशिवदयाळ स्वामींना प्रसादस्वरुप दिलेली आहे. मंदिरात असलेल्या देवघरात केंद्रस्थानी जेमतेम एक वित उंचीची ही पांढरी शुभ्र मूर्ती ठेवलेली आहे.
दत्तात्रेयांचे रूप एकमुखी की त्रिमुखी? हा भक्तांसाठी नेहमी कुतुहलाचा विषय करंजीत मात्र भक्तांचे आणखीनच कुतुहल वाढविताना दिसतो. ब्रह्मा, विष्णू व महेश या तीन देवतांमधून साकारल्याने दत्तात्रेयांना तीन मुखे असल्याचे पुराणांत व्यक्त झालेले मत आहे. त्रिमूर्तीचे उल्लेख मल्लिनाथ, बाण, कालिदास इत्यादींनी तसेच शुद्रकाने केलेला दिसतो. मात्र निरंजन रघुनाथांचे नातू विश्वनाथबोवा यांनी काशी येथे स्थापन केलेली दत्तमूर्ती एकमुखी आहे. सत्पुरुष श्रीवासुदेवानंद सरस्वती यांनीही एकमुखी दत्तमूर्तीचाच प्रचार केला तसेच गुळवणी महाराजांच्या संप्रदायातही एकमुखी दत्ताचीच चित्रे लोकप्रिय आहेत. नाशिक येथील भटजी महाराजांच्या मठामागील मंदिरातील दत्तमूर्ती एकमुखीच आहे. असं असलं तरीही दत्ताची मूर्ती ही त्रिमूर्ती म्हणूनही भक्तांमध्ये अधिक प्रचलित आहे. संत एकनाथ महाराज, संत तुकाराम दत्तांच्या त्रिमुखीचाच उल्लेख आपल्या अभंगातून करताना दिसतात. तर सुप्रसिद्ध संतसत्पुरुष श्रीरंग अवधूतांनी श्रीदत्ताला एका आदर्श शेतकऱ्याच्या रूपात उभे केले आहे. शेतकऱ्यास कधीही विश्रांती नसते त्याचप्रमाणे दत्तही नेहमीच उभा आणि संचारी असतो, अशी त्यांच्या रूपाची व्याख्या केली त्यांनी केली आहे. मात्र करंजीत दत्तात्रेय प्रभूंची पद्मासनातील त्रिमुखी मूर्ती पहायला मिळते. श्रीदत्तात्रेयांनी आपल्या आजोळी ज्ञानसाधना केल्याने ही मूर्ती पद्मासनातील असल्याचे येथे सांगितले जाते. कर्दमाश्रम पाहण्यासारखा असून, येथे स्वामी शिवदयाळ गिरी व रामचंद्र महाराज यांची समाधी आहे. करंजीतील या क्षेत्रात श्री जुना दत्त आखाड्याचीही परंपरा आहे. आखाड्याचे मठाधीपती शिवदयाळ गिरी (इ.स. १७०१ ते १८२७), सदगुरू रामचंद्र ब्रह्मचारी (इ.स. १८२७ ते १९४७), मुकूंद महाराज ब्रह्मचारी (इ.स. १९४७ ते १९५५), हरि गिरी ब्रह्मचारी (इ.स.१९५५ ते १९६९), भास्करानंद ब्रह्मचारी जोशीबाबा (इ.स. १९६८ ते १९९५) आणि आता महंत सुभाषगिरी महाराज आश्रमाची जबाबदारी सांभाळतात. कर्दमाश्रमात अनेक मंदिरे असून, गंगास्थानावर सुंदर घाट बांधण्यात आला आहे. घाटाजवळच गंगा मंदिरही आहे. श्रीगणेश मंदिर, महादेव मंदिर तसेच आश्रमातून बाहेर पडताना उजव्या हाताला सप्तशृंगी माता व विठ्ठल रुक्मिणी मंदिरही आहे. देवस्थानतर्फे विद्यार्थ्यांसाठी आश्रमशाळा, भक्तनिवास व गोशाळा चालविली जाते,
येथे स्वामी शिवदयाळ गिरी व रामचंद्र महाराज यांचे समाधी मंदिर आहे. असे सांगितले जाते की शिवदयाळ स्वामी यांच्या तपसामर्थ्यामुळे या ठिकाणी प्रत्यक्ष गंगा अवतरली व श्रीदत्तात्रेयांची मूर्ती प्रकट झाली. शिवदयाळ स्वामींकडे एकदा ज्येष्ठ शुक्ल दशमीस एक वृद्ध दाम्पत्य आले होते. स्वतः स्वामी त्यांच्याबरोबर दशमी, एकादशी व द्वादशीपर्यंत थांबले. जेवण आटोपल्यानंतर त्यांनी त्या स्त्रीचे साडी–चोळीने ओटीभरण करून त्यांना निरोप दिला. स्वामींच्या या कृतीबाबत भक्तांनी विचारले असता, साक्षात पंढरपूरचे विठ्ठल–रुख्मिणी येथे आल्याचे त्यांनी सांगितले. स्वामींनी या परिसरात १८२७ साली जिवंत समाधी घेतली. असे सांगितले जाते की समाधीनंतर पुढील सहा महिने ते जिवंत होते. त्यांना श्वास घेता यावा यासाठी जमिनीच्या उंचीपर्यंत तांब्याची नळी लावली होती, ती नळी आजही येथे पाहायला मिळते.
करंजीतील या ठिकाणी दत्त आखाड्याचीही परंपरा आहे. आखाड्याचे मठाधीपती शिवदयाळ गिरी स्वामी, सदगुरू रामचंद्र ब्रह्मचारी, मुकुंद महाराज ब्रह्मचारी, हरी गिरीजी ब्रह्मचारी, भास्करानंद ब्रह्मचारी आणि त्यानंतर महंत सुभाषगिरी महाराज यांनी या आखाड्याची जबाबदारी सांभाळली.
कर्दमाश्रमात चैत्र शुद्ध पौर्णिमा व हनुमान जयंती हे उत्सव साजरे केले जातात. ज्येष्ठ शुद्ध सप्तमी ते पौर्णिमा या काळात गंगादशहरा (गंगाउत्सव) व नामसप्ताहाचे आयोजन करण्यात येते. मार्गशीर्ष शुद्ध सप्तमी ते पौर्णिमा या काळात दत्तजन्मोत्सव साजरा केला जातो. देवस्थानतर्फे विद्यार्थ्यांसाठी आश्रमशाळा, भाविकांसाठी भक्तनिवास व गोशाळा चालविली जाते.
इथे आणखी एक आश्चर्य असं पहायला मिळालं की परिसरात असलेली सगळे कुत्रे दुपारी १२ च्या आरतीला देवळाच्या गाभा-याच्या आत जमतात आणि आरती संपल्यावर निघून जातात.
कर्दमाश्रमातील हा सोहळा पाहून आपली पावले उनंदा नदीच्या काठावर वसलेल्या आंबेवणीत वळतात.
घाटाकडून गावाकडे जाताना उजवीकडे चढावर रेणुका मातेचे सुंदर मंदिर आहे. मंदिराच्या गर्भगृहात रेणुकीचा तांदळा आहे. हा मुखवटा पूर्वी लगद्याचा होता. काही वर्षांपूर्वी मंदिराचा जीर्णोद्धार करण्यात आला यावेळी दगडी मुखवटा बसविण्यात आला. मंदिराच्या पूजारी रेणुका मातेच्या मंदिराबाबत एक अख्यायिका सांगतात की, ‘आंबेवणीपासून पुढे वरखेडा हे गाव लागते. या गावातील एक व्यक्ती वणी गावातील रेणूकेच्या दर्शनासाठी नेहमी जात असे. भक्ताच्या या भक्तीवर खूष होऊन एकदा देवी भक्तामागे वडखेडा गावाकडे निघाली. रस्त्यात भक्ताला जावणले की, आपल्यामागे कोणीतरी येत आहे. देवीनं भक्ताला सांगितलं की मी तुझ्यागावी येऊन राहणार आहे. मात्र भक्ताला काही विश्वास बसेना. आंबेवणी येथे भक्ताने अखेर मागेवळून पाहिले अन् देवी तेथेच थांबली.’ रेणुका देवी तेव्हापासून आंबेवणीच्या ग्रामदैवता असून, गुढीपाडव्याला गावात मोठी यात्रा भरते. पूर्वी यात्रेत बोहाड्याची सोंगे व्हायची; मात्र आता सोंगाचा कार्यक्रम होत नाही. गावात रेणुकामंदिरासमोर लाकडी बांधणीचे मारूती मंदिर आहे. याशिवाय गणपती मंदिर, शिवालय व पांडूरंग मंदिर आहे.
गावात वडजेंचे तीन वाडे व गायकवाडांचा एक वाडा आहे. गायकवाडांचा वाडा आता पूर्णपणे पडला असून, त्याची भिंत गावात ये-जा करणाऱ्यांना गावचा इतिहास सांगत असते. गायकवाडांचे कुटुंब गावात राहाते. तसेच वडजेंचे वाडे गावात आहेत. वडजेंचा वाडा नऊ खणी असून, वाडा संस्कृतीच्या सर्व खाणाखुणा या वाड्यात अनुभवायला मिळतात. धान्य साठवणीच्या वाड्याच्या भिंती रांजणांपासून वाड्यातील आड, चौक अन् दोन मजली वाड्यासाठीचे तीन जीने पाहण्यासारखे आहेत. वडजे मूळचे राजस्थानमधील चितोडचे. महाराणा प्रतापांनंतर ते धोडपजवळील वणी संगमनेर येथे आले. तेथून त्यांना आंबेवणीतील पाटीलकी मिळाली. वडजेंचे काही कुटुंब मडकेजांब येथे तर काही म्हसरूळ येथे स्थिरावली आहेत. वडजेंच्या अनेक नोंदी राजस्थानहून येणाऱ्या भाटांकडे मिळतात, गावात आजही लहान लहान वाडे अन् बाराबलुतेदारी या ग्रामसंस्कृतीच्या पाऊलखुणा पहायला मिळतात.
आंबेवणी पूर्वी प्रसिद्ध होते ते आंबे अन् डांगरांसाठी. आंबेवणीतील डांगर पखवाजाऐवढे मोठे असायचे. तसेच फ्लॉवर व कोबीसाठीही आंबेवणी प्रसिद्ध होते. आंबेवणीची भाजी मुंबईला जायची. मात्र आता ना आंबे मिळत ना डांगर. भाजीपाला शेतीही नावालाच होते. आता आंबेवणीकर द्राक्ष उत्पादक झाले आहेत. आंबेवणीने काळानुसार कात टाकली असली तरी वाड्यांच्या रूपाने व कर्दमाश्रमाच्या रूपाने आजही आंबेवणीचा साज कायम आहे. निसर्गसौंदर्याने नटलेले आंबेवणी रखरखत्या उन्हात पाहण्याची मजाच काही औरच आहे.
+918007633376
https://truecaller.com/search/in/+918007633376
उपयुक्त माहिती:
- दिंडोरीपासून १४ किमी, तर नाशिकपासून ३८ किमी अंतरावर
- दिंडोरीपासून आंबेवणी गावापर्यंत एसटीची सुविधा
- आंबेवणी गावापासून एक किमी अंतरावर
- खासगी वाहने आश्रमापर्यंत जाऊ शकतात
- मंदिर ट्रस्टतर्फे दुपारी भाविकांना महाप्रसादाची सुविधा
- मंदिर ट्रस्टतर्फे भक्तनिवासाची सुविधा
वीरांचे एकदरे :-

प्रत्येक वीरगळ वेगवेगळ्या घटना सांगतात. त्या वीराच्या कथा शेकडो वर्षांपासून आपल्या ह्दयाशी जपून ठेवताना दिसतात. वीरगळीच्या सर्वांत वरच्या बाजूला देवळाच्या कळसासारखा अथवा गोलाकार त्रिकोणी आकार असतो. वीरगळीवर घोड्यावर बसलेला वीर हातात तलवार घेऊन कोरलेला असतो. वरच्या बाजूला अथवा खाली एक किंवा दोन महिलांच्या प्रतिमा कोरलेल्या असतात. या महिला म्हणजे त्या वीराच्या मृत्यूनंतर सती गेलेल्या बायका दाखविलेल्या असतात. तसेच वीरगळीवर वरच्या बाजूला दोन्ही बाजूस चंद्र-सूर्य कोरलेले असतात. जोपर्यंत चंद्र-सूर्य उगवत आहेत, तोवर या वीराची कीर्ती कायम राहील, हे यातून वीरगळ उभारणाऱ्यांना सांगायचे असेल. आदिवासी भागात सपाट शिळेवरील वीरगळी अधिक दिसतात. त्यांची उंची एक ते अगदी दहा फुटापर्यंतही असते. तर शिव मंदिरांभवती असणाऱ्या वीरगळींचा आकार चौकोनी गोलकडा अन् प्रमाणबद्ध असलेली असते. वीरगळाची रचना, नक्षीकामही त्या-त्या वेळच्या काळाच्या कडा उलगडतात. घोड्यावरील वीराच्या वेशभूषेवरून व डोक्यावरील टोपावरून तसेच वीरगळीवरील नक्षीवरून तो वीर किती प्रबळ होता हे दाखविले जाते. तर आदिवासी भागात दगडी वीरगळींबरोबरच गावातील प्रसिद्ध, हुकमी व्यक्तीच्या चिराही उभारण्याची पद्धत पूर्वी होती. त्याचे शिल्लक अवशेष अन् अस्पष्ट व अज्ञात होत असलेल्या वीरगळी एकदरेत पहायला मिळतात. एकदरेतील हा इतिहास अज्ञात असला तरी हे गाव वीरांचे गाव असल्याचे वीरगळींचा हा समूह दाखवितो.
एकदरेत वारली आदिवासी राहतात. वारली ही जंगल व डोंगराळ प्रदेशात वास्तव्य करून राहत आलेली एक प्राचीन आदिवासी जमात आहे. वारलं म्हणजे नांगरलेल्या जमिनीचा भाग, तुकडा; ‘ वारली ‘ शब्द याच अर्थाचे समूहनाम/ विशेषनाम आहे. वारली म्हंटलं की आपल्या डोळ्यासमोर चटकन वारली चित्रकला येते. या आदिवासी संस्कृतीची वारली चित्रकला ही अविभाज्य अंग असली तरी एकदरेत ही कला नामशेष झालेली दिसते. या कलेला आपल्याकडे व्यासपीठ न मिळाल्याने नाशिक जिल्ह्यातील अनेक भागात टिकून असलेली ही कला हद्दपार होण्याच्या मार्गावर आहे. लग्नसोहळ्यांमध्ये मातीच्या घरांच्या भिंतींवर लग्नाचा चौकाच्या चित्रातून दिसणारी ही कला अखेरचा श्वास घेताना दिसते. एकदरेत आता कोणीही वारली चित्र काढत नाही. काही लोकगीतेच फक्त होळी, दिवाळी आदी सणांना गायली जात असल्याने ती टिकून आहेत,

वरूण देवाला प्रसन्न करण्यासाठी कांबडी नाच मात्र एकदरेत पहायला मिळतो. कांब म्हणजे काठी. ज्याच्या हाती घुंगरे लावलेली कांब असते तो कांबडी. मांदल नाच होळीत तर घोर नाच किंवा टिपरी नाच दसऱ्यापासून दिवाळीपर्यंत केला जातो. भक्तीभावाने अन् बेभान होऊन काठी नाचविली जाते. अशीच एक सागाची उंच काठी मारूती मंदिरासमोर उभी करण्यात आली आहे. तिला सणांमध्ये सजवलं जातं. मात्र बोहाडे अथवा सोंगे करण्याची परंपरा गेल्या पंधरावर्षांपासून बंद पडली आहे. पाड्यावर वीज आली तसा टीव्हीही आला अन् बोहाड्याची जागा या मनोरंजन करणाऱ्या चौकटीने घेतली. मात्र वारली आदिवासींची प्रथा परंपरेवरील श्रद्धा कमी झालेली नाही. मारूती मंदिरात नियमित सप्ताह होतो. मारूती मंदिरापासून काही अंतरावर दमणगंगा वाहते. दमणगंगेचा करंजी डोह एकदरेच्या ग्रामस्थांसाठी खास आहे. तेथे देवीचे व शंकराचे छोटेखानी मंदिर आहे. या डोहाबद्दल अख्यायिका आहे मात्र ती सांगणारी पिढी आता गावात नसल्याने आता ती कोणाला सांगता येत नाही. नाचणी, उडीद, भात या पारंपरिक पिकांबरोबर अनेक रानभाज्याही हे आदिवासी दररोजच्या गरजा म्हणून पिकवितात. त्यांची एक सवय मात्र अजब आहे. ती म्हणजे चहा ऐवजी कॉफी पिण्याची. कॉफी! हो धक्का बसेल पण, एकदरेतील बहुतांश आदिवासी चहा पित नाहीत तर कॉफी पितात. याला कारणही तसं आहे. टाकळा ही कोवळ्या पानाची पालेभाजी आदिवासी पिकवितात. टाकळा या रानभाजीला शास्त्रीय नाव आहे कॅशिआ टोरा. हे गाव डॉ. देवदत्त देशमुख यांनी लक्षात आणून दिले. आदिवासी गावांमध्ये त्वचा रोगाचे प्रमाण अधिक असते. मात्र इतर आदिवासी गावांप्रमाणे एकदरेत त्वचारोग नाही. याला ही कॉफी म्हणजे ही टाकळा (कॅशिआ टोरा) अनुकल ठरत असल्याचेही डॉ. देशमुख सांगतात. या रानभाजीला शेंगाही येतात. त्या शेंगांची भाजीही केली जाते. टाकळाच्या बियांना तरोटाही म्हणतात. त्या तव्यावर कडक गरम करून नाचणी दळावी तसे ते टाकळाच्या बिया म्हणजेच तरोटा जात्यावर दळतात अन् तयार होते कॉफी! तरोट्याचे पिठाची ही कॉफी ओठांवर खिळून राहते. एकदरेत गेलात अन् कॉफी पिली नाही तर ही सफर पूर्ण होत नाही. कॉफी केव्हापासून केली जाते हेही त्यांना माहिती नाही मात्र गेली अनेक पिढ्या हेच चालत असेल, असे ते सांगतात.
नदीचा काठ असो वा लेणीच्या परिसरातील गावे आपल्या संस्कृतीच्या खाणाखुणा असलेल्या वीरगळ, सतीशिळा अनेक गावांमध्ये विखुरलेल्या रूपात पहायला मिळतात. यावर पुरेसे संशोधन न झाल्याने हे शिल्प कोणी उभारले अन् केव्हा उभारली तसेच ही शिल्पे नक्की काय आहेत असा अनेकांना प्रश्न पडतो. हा अज्ञात वारसा नोंदविला गेला पाहिजे, त्यादृष्टीने प्रयत्न झाल्यास मोठा वारसा पुढील पिढ्यांना किमान पाहण्यासाठी तरी साठविता येईल, असे एकदरे सांगताना दिसतो.
बडोद्याच्या प्रधानाचे देवरगाव
स्थान व ओळख
• योगीराज हरे कृष्ण बाबा हे महाराष्ट्रातील देवरगाव (ता. चांदवड, जि. नाशिक) येथे स्थित धार्मिक व्यक्ती आहेत .
•
त्यांच्यावर आधारित माहितीपट आणि सामग्री गुंफण अकादमी, सातारा या
संस्थेकडून तयार करण्यात आली असून, लेखनकार डॉ. बसवेश्वर चेणगे यांनी
त्यांचे जीवनचरित्र लेखले आहे .
पूजा-पाठ आणि सामाजिक श्रद्धा
• देवरगावमध्ये त्यांच्या नावाने आरती आणि भजनांचा अनुष्ठान नियमितपणे आयोजित केला जातो .
•
Instagram वरील पोस्टनुसार, त्यांनी (योगीराज हरे कृष्ण बाबा देवरगाव –
पुण्यभूमी) अनेकदा उल्लेख केला आहे आणि त्यांच्या संजीवन समाधी सोहळ्याचे
(उदा. १०६ वा अथवा १०७ वा) आयोजन देखील झाले आहे .
भक्तांची श्रद्धा
•
“पोस्ट्समध्ये त्यांना ब्रह्मांडनायक व सिद्ध संत म्हणून साजरं केलं जातं,
आणि 'हरे कृष्ण नाम मुखी' हे त्यांच्याशी जोडलेले अभंग-उपदेशात्मक वाक्य
आहे” .
• भक्तांचा मनापासून श्रद्धा भाव आहे आणि
त्यांचं नाव घेतल्यानंतर जीवनाचा आनंद अनुभवण्याबद्दल अनेकांनी लिहिलेलं
आहे — “तोची एक सदा सुखी!”
पाताळेश्वराचे अनोखे पाळे
तथाशूद्रजनप्राया सुसमृद्धकृषीवला /
क्षेत्रोपभोगभूमध्ये वसतिर्ग्रामसंज्ञिता //
पुराणांमध्ये गाव म्हणजे नेमके काय ही संकल्पना या श्लोकात मांडली आहे. म्हणजेच माणसाला पूर्वीपासूनच एकत्र रहायला आवडतं. एकमेकांच्या आयुष्यात रमायला आवडतं. गाव म्हणजे ज्याच्याभोवती कीर्दसार-वहितीला (शेती) योग्य जमीन आहे आणि जिथे मातब्बर शेतकरी व पुष्कळसे मजूर आहेत, अशा वस्तीला गाव म्हणतात. गावच्या हद्दीला किंवा सीमेला शीव ही संज्ञा आहे. गावाचे स्वभावत: आणि एकमेकांपासून अलग असे दोन भाग उघड उघड पडतात. एक पांढरी किंवा गावठाण आणि दुसरा काळी किंवा रान, काळी आणि पांढरी या संज्ञा जमिनीच्या रंग व गुणधर्मावरून प्रचारात आल्या असाव्या. काळी जमीन काळी किंवा काळसर असून, भुसभुशीत असते, ती पाणी धरते व खचते. पांढरी जमीन पांढरसर, आवळ व निबर असून पाणी ढाळते.
यामुळे काळी जमीन जितकी वहितीला उपयोगी, तितकी इमल्याला (घरांसाठी) नसते आणि पांढरीवर जसा इमल्याला धर सापडतो, तसा कंदमुळांना सापडत नाही, अशी गावाची व्याख्याच गावगाड्यात मांडली आहे. अर्थात आता मातीची घरे बांधण्याची संकल्पनाही मागे पडली आहे. मात्र मातीच्या घरात राहण्याचा आनंद काही वेगळाच असतो हे नाशिकच्या कोणत्याही गावात गेलात तर अनुभवायला मिळू शकते. गावठाणात पांढरीवर गाव वसलेले असते अन् काळीवर शेती. गावाच्या ज्या जागेवर माणस घरेदारे करून नांदतो तिला पांढरी, आई-पांढर किंवा गावठाण म्हणतात. ज्या जागेत शेती करतात तिला काळी, आई-काळी, रान किंवा शिवार म्हणतात. शहरातील फ्लॅट संस्कृतीप्रमाणे गावातही शेतातील बंगल्यांमध्ये वेगळं राहण्याची संकल्पना अधिक बळावल्याचे पहायला मिळू लागले आहे. यामुळे ग्रामसंस्कृतीची वाटचाल शहरसंस्कृतीकडे सुरू झाल्याचा भास व्हायला लागतो.
गावातील सिंमेटच्या घराभवती धीर सोडत असलेली घरे पाहताना स्थापत्यशास्त्रातील घरांच्या बांधणीची ही पिढी परत कधीच पाहता येणार नाही याची हुरहुर मात्र कायम मनात राहते. बदलत्या ग्रामीण जीवनावर आजही ग्रामदैवत व गावातील विविध दैवतांचा पगडा घट्ट असल्याने का होईना अनेक गावांचे गावपण अजूनही टिकून आहे. सण, उत्सव, जत्रेनिमित्त का होईना आजही गाव एकत्र येताना दिसतं अन् हरविलेल्या, हरवत चालेल्या गावावर चर्चा होताना दिसते. कळवण तालुक्यातील पाळे बुद्रुक व खुर्द ही जोडगोळी अशाच बदलाची स्थित्यंतरे उलगडताना दिसते. ग्रामदैवतांनी गावपण टिकविल्याचा अनुभव अन् जुन्या घरांचा ओलावा येथे अनुभवायला मिळतो. तर पौराणिक व ऐतिहासिक आठवणीही गावाने जोपासल्या आहेत.
नाशिक ते सप्तश्रृंगी गड साधारण ६५ किलोमीटर अंतर आहे. उजव्या हाताने गडाकडे न जाता कळवणकडे जाणाऱ्या रस्त्याने पाच-सहा किलोमीटर गेले की, कोल्हापूर फाटा लागतो. या फाट्याला कोल्हापूर फाटा म्हणण्यामागे गंमतीशीर किस्सा दडलेला आहे. अनेकांना कोल्हापूर फाटा म्हटलं की बुचकळ्यात पडल्यासारखे होते. मात्र, पूर्वी या परिसरात कोल्हे फार होते आणि हा रस्ता कच्चा होता. त्यामुळे या ठिकाणाला कोल्हापूर म्हणण्याची पद्धत रूढ झाली. या फाट्यावरून डाव्या हाताने आत शिरले की पाळे गाव लागते. पाळे गिरणा नदीच्या अल्याडपल्याड वसले आहे. अल्याडपल्याड म्हणजे दोन्ही किनाऱ्यावर पाळे हेच गाव आहे. अलीकडच्या गावाचे नाव आहे पाळे बुद्रूक तर नदी पलीकडे आहे पाळे खुर्द. नाशिकमध्ये अनेक गावांना ब्रुद्रुक आणि खुर्द हे शब्द चिकटलेले पहायला मिळतात. बुद्रुक व खुर्द हे शब्द फारसी असल्याने ते मोगल काळात प्रचलित झाले असावेत. ‘
खुर्द’ म्हणजे लहान. मोठ्या गावाच्या शेजारी वसलेली लहान वा किरकोळ वस्ती म्हणजे ‘खुर्द’. ‘बुद्रुक’ हा शब्द ‘बुजुर्ग’ या फारसी शब्दाचा अपभ्रंश असून, ‘बुजुर्ग’ म्हणजे मोठा किंवा थोर. म्हणजेच मुख्य किंवा मोठं गाव म्हणजे ‘बुद्रुक’. येथे बुजुर्ग शब्दाचा अपभ्रंश होऊन तो बुद्रुक असा स्वीकारला तर खुर्द हा शब्द जशाच्यातसा घेतला. फारशीतील अनेक शब्द आपण अपभ्रंश किंवा जसेच्या तसे घेतल्याचे पहायला मिळतात. साधारणत: बुद्रुक आणि खुर्द ही जोडगोळी पहायला मिळते. कोल्हापूर फाट्यावरून गावात प्रवेश करताना पहिल्यांदा आपण पाळे बुद्रुकमध्ये प्रवेश करतो. गावाला पाळे नाव कशावरून पडले याबाबत अनेक अख्यायिका सांगितल्या जातात. सुरत लुटीनंतर परतताना छत्रपती शिवाजी महाराज पाळेगावात थांबले होते तेव्हा त्यांनी गावाचे नाव पाळे ठेवले, असे पाळे खुर्दमधील मनोज पाटील सांगतात तर पाळे बुद्रुकमधील पाताळेश्वर मंदिरामुळे गावाला पाळे नाव पडल्याचे पाळे बुद्रुकचे गावकरी सांगतात. महादेवाने पालन पोषण केलेले गाव म्हणून ‘पाळे’ असेही म्हटले जाते.
पाळे गावाला पौराणिक अख्यायिकेचाही संदर्भ आहे. श्रीराम नाशिकमध्ये वनवासाला असताना ते पाळे गावातूनच संतश्रृगी गडावर देवीच्या दर्शनासाठी गेले होते. यावेळी श्रीरामाने गावात महादेव मंदिराची स्थापना केली होती म्हणून या मंदिराला ते मंदिर महादेवाचे असूनही रामेश्वर मंदिर असे म्हटले जाते, रामेश्वर मंदिर पूर्वी दगडी बांधणीतील होते. मंदिरातील महादेवाची पिंड दक्षिणमुखी आहे. पिंडीवर महादेवाचा शेषधारी तांब्याचा मुखवटा आकर्षक आहे. दगडी मंदिर पाडून ग्रामस्थांनी मंदिराचा जीर्णोद्धार केला आहे. जुन्या मंदिराचे अवशेष या मंदिराच्या आजूबाजूला पहायला मिळतात. मंदिराच्या व्यवस्थेसाठी देशपांडे घराण्याने २६ एकर जमीन मंदिराला दान दिली आहे. या जमिनीचा दर पाच वर्षांनी लिलाव होतो. रामेश्वर मंदिराजवळच पाळे बुद्रुकच्या हनुमानाचे मंदिर आहे. हा हनुमान सप्तश्रृंगी गडाकडे पाहतो आहे. श्रीराम जेव्हा पाळे गावातून गडाकडे निघाले तेव्हा त्यांना हनुमान पाहत आहे, अशी अख्यायिका ग्रामस्थ सांगतात.
हनुमान मंदिरासमोर देशपांडेंची गढी होती. आता ती जमीनदोस्त झाल्याने तिचे विखुरलेले अवशेष पहायला मिळतात. पाळे बुद्रुक देशमुख व देशपांडे तर खुर्द पाटलांचे म्हणून प्रसिद्ध आहे. देशमुखांना अठरा गावांची देशमुखी होती. देशपांडेंकडे महसुलाची जबाबदारी होती. त्यांची गढी आता नाही; मात्र त्यांचे वंशज गावात आजही आहेत. तर मोरे-शिंदेंना गावची वतनदारी होती. त्यांचे वंशजही गावात आहेत, बाराबलुतेदारी पद्धत गावातील वेगवेगळ्या गल्ल्यातून आजही पहायला मिळते. आजूबाजूच्या गावांसाठी पाळे बाजारपेठेचे ठिकाण होते. देशपांडेंच्या गढीतून एक भुयार गिरणा नदीतील चुहेली डोहात निघायचे. गढी पडल्याने हा बोगदाही बुजला. मात्र चुलीसारखा दिसणारा हा डोह अजूनही गढीच्या आठवणी सांगतो. या डोहात शस्त्र ठेवले जायची तसेच लपण्याची जागाही येथे होती, अशी अख्यायिका ग्रामस्थ सांगतात.

बुद्रुकमध्ये राम मंदिर, हनुमान मंदिर, दत्त मंदिर, खंडेराय मंदिरे आहेत. रामाचे मंदिर पूर्वी लाकडी बांधणीचे होते ते आता सिमेंटचे झाले आहे. राम मंदिराला खाकी आखाड्याच्या साधूंची मोठी परंपरा आहे. नाशिकमधील नागचौकातील खाकी आखाड्याचे महंत खाकीदास, बालकदास, जानकीदास गरीबदास व सध्या खाकी आखाडा सांभाळणारे नरसिंह दास यांनी पाळे गावात तपश्चर्या करून पुढे मठाची जबाबदारी सांभाळली आहे. हे सर्व साधूमहंत याच गावचे असल्याचे ग्रामस्थ सांगतात. राम मंदिरासमोरच एक कुंड आहे. कुंडात महादेवाची पिंड तर शेजारी हनुमानाचे आणखी एक मंदिर व चावडीची जुनी इमारत आहे. पाळे बुद्रूकमध्ये महाशिवरात्रीला महादेवाचा उत्सव तर पाडव्याला बोहाडे होतात. २६ सोंगांच्या बोहाड्याची जबाबदारी २६ घरात दिलेली आहेत.
विशेष म्हणजे देशमुख व देशपांडेंकडेही बोहाड्याच्या सोंगांची जबाबदारी आहे. दर तीन किंवा पाच वर्षांनी सोंगांचा कार्यक्रम केला जातो. बोहाड्यातील संक्रांतीचा म्हणजेच देवीचा अवतार घेणारे सूत्रधार यशवंत देशमुखांनी आता सत्तरी ओलांडली आहे. मात्र बोहाड्यात संक्रांत साकारण्याची त्यांची जिद्द मात्र कमी झालेली नाही. उत्साहाला वय नसतं असं सांगताना ते म्हणतात,‘बोहाडे कोठून आले, का आले माहिती नाही पण गावाला गावपण देण्याचं काम हा उत्सव करतो. प्रत्येकाला एकत्र ठेवण्याचे अन् तीन वर्षातून एकदा का होईना ग्रामदैवतेच्या साक्षीने जगण्याचे भान देतो. वय झालं असलं तरी अजून एकदा तरी बोहाड्यात देवीचा अवतार होऊन नाचायचं आहे.’ यशवंत देशमुखांप्रमाणे, विकास देशपांडे व इतरही अनेकांनी बोहाड्यातील सोंग उत्सवापर्यंत देवघरात जपून ठेवली आहेत. देशमुख स्वत: बोहाड्यांची देखभाल दुरूस्तीचे कामही पाहतात. गावाला कळवण येथील संत बाबांमुळे गावाला भजन परंपरा जपली आहे.

चावडीसमोरच कीर्तनकार प्रभाकर खैरनार महाराजांचे घर आहे. बाहेरून पाहिल्यास हे घर वाटते; मात्र घरात गेल्यावर आठ खणाचा मोठा वाडाच असल्याचा भास होतो. सुरूवातीला चार खोल्या पार करून आत गेल्यावर वाड्यासारखा चौक लागतो. त्यापुढील पुन्हा चार खोल्यापार केल्यावर गावच्या दुसऱ्या रस्त्याला त्यांचे घर संपते. इतक्या मोठ्या घराची रचना अनोखी अन् दुर्मिळ वाटते. खैरनार यांच्याकडे जुन्या हस्तलिखितांचा संग्रह आहे. हतगडचे वंशज मनोहरराव मोरे यांच गावचे. त्यांच्याकडील ताम्रपटाचा अन् मोडीतील कागदपत्रे पाहून गिरणानदीवरील पूल ओलांडून पाळे खुर्दमध्ये जाता येते. केमच्या डोंगरातून गिरणा पुढे वाहत जाते. गिरणामुळे हा परिसर सुजलाम् सुफलाम् झाला आहे. पुलावरूनच पाळे खुर्दमधील अष्टभुजा नारायणी देवीचे मंदिर आपल्याला खुणावत राहते. या मंदिरातील देवीची स्थापना छत्रपती शिवाजी महाराजांनी केल्याचे पाळे खुर्दमधील ग्रामस्थ सांगतात. गावात हनुमान, दत्त, संतोषी माता आदी मंदिरे आहेत.
दरवर्षी शाकांबरी पोर्णिमेला अष्टभुजा देवीची यात्रा होते. यावेळी तमाशा, कुस्ती हे मुख्य आकर्षण असते. मात्र खुर्दमध्ये बोहाडे होत नाहीत. गिरणा नदीवर ब्रिटीश काळात लिफ्टची योजना उभारण्यात आली होती. त्याची इमारतही या गावात पहायला मिळते. खुर्दमधील हनुमानाला शेंडीचा हनुमान म्हटले जाते. शेंडी असलेला हनुमान इतरत्र नसल्याचे ग्रामस्थ सांगतात. या हनुमानाला तांब्याच्या कवचाने मढलेले आहे. त्यामुळे शेंडीचा हनुमान आवर्जून पहावा असा आहे.
महादेवाने पालन पोषण केलेले, रामाचा पदस्पर्श, छत्रपतींच्या आशीवार्दाने भारावलेले पाळे पाहताना ग्रामीण जीवनाचा स्पर्श अनुभवायला मिळतो. हा ठेवा कायम राहावा ती मातीचं घर, मंदिरांचा साज जपण्यासाठी त्यांचे पालनपोषण करण्यासाठी पाळे धडपडताना दिसते.
सोंगांचं चाचडगाव
व्यक्तीवर त्या-त्या सामाजिक परिस्थितीचा प्रभाव पडतो अन् त्या व्यक्तीचे व्यक्तिमत्त्वात रुपांतर होतं. मात्र प्रत्येक व्यक्तिमत्त्वाला एक मुखवटा असतो. हा मुखवटा त्यांच्या स्वार्थ, व्यथा, वेदना अन् सुखाशी इतरांना अज्ञात ठेवण्याचा प्रयत्न करीत असतो. त्यामुळेच मुखवटा अन् चेहरा हे समीकरण सर्वांना कायम स्तिमीत करत आलं आहे. म्हणूनच माणूस आणि मुखवटा यांचा एकमेकांशी वेगळा ऋणानुबंध जडला आहे. पण कोठून आले हे मुखवटे, कधी आले, कसे आले, कोणी आणले आणि आता ते कुठे आहेत? असे अनेक प्रश्न प्रत्येकालाच सतावतो. मुखवट्यांना प्रत्येक धर्मात अन् समाजात परंपरेच्या अर्थाने एक वेगळं महत्त्वही आहे. देवघरातील टाकांपासून घर सजविताना भिंतीवर टांगलेल्या विदुषकाच्या मुखवट्यापर्यंत आपला कुठे ना कुठे या कलेशी संबंध येतो. महाराष्ट्रातील मुखवट्यांची परंपरा केरळमधून कोकणमार्गे अडीचशे-तीनशे वर्षांपूर्वी महाराष्ट्र फलश्रुत झाली. १७२८ साली श्यामजी नाईक काळे व शिवराम नाईक गोडबोले या दोन कीर्तनकारांनी कर्नाटकातून यक्षगान हा लोककला प्रकार महाराष्ट्रात आणला. त्याला पुढे दशावतार व नमन-खेळे या वेगवेगळ्या नावाने ओळखले जाऊ लागले. नमन-खेळेतील गीतांमध्ये राघोबादादांचा उल्लेख येतो, यावरून हा प्रकार पेशवाई काळापासून होत असावा. हळूहळू ही बोहाड्याची (आखाडी, भवाडा, सोंग) परंपरा कोकणातून ठाणे, नाशिक भागातील आदिवासींमधून रुजली. बोहाडा अथवा आखाडी हा ग्रामीण जीवनाचा अविभाज्य घटक आहे. कारण नाशिकमधील जवळपास प्रत्येक गावात बोहाड्यांचा कार्यक्रम अगदी अलीकडेपर्यंत जल्लोषात साजरा व्हायची. अजूनही काही गावात ते कसेबसे टिकूनही आहेत. बोहाडा हे मुख्यत: मुखवटानाट्य आहे. आदिवासींमध्ये जंगली प्राण्यांचे मुखवटे धारण करून त्यांची सोंगे सादर केली जायची. परंतु, त्यांचा शहरांशी संपर्क वाढत केल्याने शहरी संस्कृतीचा व देव-देवतांचा प्रभाव त्यांच्या बोहाड्यांवरही पडला अन् प्राण्यांची जागा देव-देवतांच्या मुखवट्यांनी घेतली. त्यांची सादर करण्याची पद्धत नाट्यसादरीकरणाकडून मिरवणुकीत नाचण्यापर्यंत बदलेली. गाव उत्सव, होळी व धार्मिक सणांनिमित्त बोहाडे नाचविले जातात. पण बोहाड्यांमध्ये नाचविले जाणारे मुखवटे येतात कोठून अन् ते कोण बनवितो हे उलगडण्यासाठी चाचडगावात जावं लागतं. हा प्रवास आपल्याला एका वेगळ्या कलेशी जोडतो.

उत्सवांमधून गावातील वीरांच्या कथा सांगण्यासाठीच गावात बोहाड्याच्या सोंगांची निर्मिती होऊ लागली असावी, असे या वीरगळींकडे पाहिल्यावर वाटायला लागतं. चाचडगावात आंबेकर व पेगमहाले ही दोन कुटुंब सोंगे बनविण्यासाठी ओळखली जात होती अन् ही ओळख गावापुरतीच नव्हती, तर जिल्ह्यातील कानाकोपऱ्यातून या दोन कुटुंबीयांकडे सोंगांची मागणी असे. गेल्या तीन-चार पिढ्या ही दोन कुटुंब बोहाड्यांसाठी सोंग बनवित आले आहेत. मात्र गावागावांतील घरांवर डीश टीव्हीच्या छत्र्यांची गर्दी वाढू लागली अन् मनोरंजनाची संकल्पना बदलत गेली. पूर्वी गावातील उत्सव, धार्मिक व सामाजिक सोहळेच मनोरंजनाचे मुख्य स्त्रोत होते अन् ते अधिक बहारदार करण्यासाठी सोंग नाचविणे हा एक विशेष मनोरंजनाचा कार्यक्रम समजला जायचा. पण काळ जसा बदलत गेला तसा सोंगांऐवजी गावाच्या चौकात चित्रपट दाखविले जाऊ लागले. घराघरात टीव्ही आले अन् सोंगांचे मनोरंजनाचे मुख्य काम हिरावले गेले. सोंगं आता धार्मिक कार्यक्रमांपुरतेच मर्यादित झाले आहेत. त्यातच अनेक गावांत बोहाड्यांमध्ये दारू अन् गोंधळाचा प्रादुर्भाव झाल्याने बोहाड्यांच्या परंपरेला खीळ बसली. बोहाड्यांचे खेळ करणारी अन् सोंग ठरलेली मानापानाची कुटुंबे नव्या पिढीपर्यंत ही कला पोहचवू शकली नाहीत. त्यामुळे शिक्षणासाठी गावाबाहेर पडलेली नवी पिढीही यापासून दुरावली. याचा परिणाम सोंगांसाठी मुखवटे बनविणाऱ्या कलाकारांवर झाला अन् पेगमहाले या कलाकाराने व त्यांच्या पुढील पिढीने मुखवटे बनविण्याऐवजी पोटाची खळगी भरू शकेल असा नवा व्यवसाय निवडला. गावातील आंबेकर या कुटुंबातील मुखवटे बनवू शकेल, अशी शेवटची व्यक्तीही या कलेपासून लवकरच दुरावेल अशी स्थिती आहे. ‘मागील तीन-चार पिढ्यांपासून आम्ही मुखवटे बनविण्याच्या व्यवसायात आहोत. हा व्यवसाय करताना जोड धंदा हवाच. पूर्वी जवळपास प्रत्येक गावातून मुखवट्यांची मागणी असायची त्यामुळे तीस-चाळीस मुखवट्यांचा एक संच असे अनेक संच तयार ठेवावे लागत. त्यामुळे वर्षभर काही ना काही काम सुरू असे. माझे आजोबा तुकाराम आंबेकर व वडील रघुनाथ आंबेकर यांची सोंगांसाठी मोठे योगादान दिले आहे. मात्र यावर वाढलेला संसार आता चालू शकणार नाही हे लक्षात आल्याने घरातील इतर मंडळी मुखवट्यापासून दुरावली. मी मुखवटा कलाकार आहे. मात्र आता सोंगांना पूर्वीसारखी मागणी नाही. एक संच भाड्याने दिल्यावर चार-पाच हजार रूपये भाडं मिळतं; मात्र यावर वर्षभराचा संसार चालू शकत नाही. त्यामुळे आता मुखवट्याचे काम कमी करून शहरात भंगार व्यवसाय सुरू केला आहे. माझी मुले शिकत असल्याने तेही या कलेपासून दुरावली आहेत. बहुतेक मुखवटे बनविणारी आंबेकरांमधील माझी शेवटची पिढी ठरेल,’ असे सांगताना मुखवटा कलाकार विजय रघुनाथ आंबेकर व त्यांची आई राधाबाई रघुनाथ आंबेकर यांचे डोळे भरून येतात. मात्र सोंगांचे कलावैभव किती समृद्ध आहे हे सांगताना ते थकत नाहीत.
गणपती, सरस्वती, शेंद-आसूर, वाली-सुग्रीव, वराह, दुःशासन, भीमा, अर्जुन, मच्छ, खापऱ्या चोर, नारद वाल्मिक, राम, लक्ष्मन, श्रृपनखा, खंडेराव, महादेव, काळभैरव, चंद्रसूर्य, नरसिंह, महिषासूर, देवी, वेताळ, म्हशा आदी मुखवटे तर डोक्यात घालायचा टोप तसेच अनेक पात्र असलेल्या मुखवट्यांच्या ताठी म्हणजेच पाच पांडव ताठी, कृष्ण ताठी, बळीराम ताठी, रावण ताठी, रक्तादेवी ताठी, मारूती ताठी हे मुखवटे विजय आंबेकरांच्या मातीच्या घरातील माडीवर पहूडलेले पाहताना मन थक्क होतं. मुखवटे हातात घेऊन त्यावरील धूळ बाजूला करतांना विस्मरणात जाणाऱ्या कलेला आपण शेवटचे भेटतो आहोत हा भास अंगावर काटा उभा करतो. प्रत्येक मुखवटा चेहऱ्यावर लावताना अन् त्या मुखवट्याच्या डोळ्यातून जग पाहताना नक्की कोण आपला चेहरा हरवत आहे? हा प्रश्नही मनाला अस्वस्थ करतो. मुखवटा काढताना तो निघत नसल्याचा भास ‘मला सोडून जाऊ नका’ अडगळीत टाकू नका’, असे सांगतो आहे की काय असं वाटायला लागतं. मुखवट्यांवर साचलेली धूळ मुखवट्यांवर आहे की आपल्याच चेहऱ्यावर मढवलेली आधुनिकतेची ती धूळ आहे असाही विचार मनात काहूर माजवतो.
आंबेकरांच्या घराच्या माडीवर मुखवट्यांचे छोटेखानी संग्रहालय पाहताना एका कोपऱ्यात जमिनीवर मातीत एक चेहरा साकारलेला आहे. हे काय असावं असा प्रश्न पडतो तोच त्याचं कोडही उलगडतं. हा चेहरा मुखवट्यांचा मातीचा साचा आहे. कागदी लगदा, मेथी चार-पाच दिवस भिजत घालून नंतर तो ठेचून घेतला जातो व चपातीसाठी पीठ मळतो तसं तो लगदा मळला जातो अन् तो मातीच्या त्या साच्यावर थापला जातो. साच्यामुळे चेहऱ्याचा एक आकार तयार होतो अन् त्यातून वेगवेगळे मुखवटे आकार घेतात. तो साच्या मला थोडं आश्वस्त करतो की मी अजून आहे! जगतानाच्या वेदना विसरून काही आनंदाचे क्षण बोहाड्याच्या निमित्ताने का होईना पूर्वी ग्रामस्थांना मिळायचे, त्यांना एकत्रित बांधून ठेवायचे; मात्र झपाट्याने बदलत गेलेल्या मनोरंजनाच्या साधनांनी बोहाड्यांना दारिद्रय दाखवलं. बोहाड्यांची परंपरा नाशिकमधून हद्दपार होतेय असेच नाही तर या बोहाड्यांमध्ये रंग भरण्याचे काम करणारे मुखवटे बनविणारे कलाकारही अज्ञात होऊ लागले आहेत. बोहाड्यांच्या निमित्ताने दर्शन देणाऱ्या मुखवट्यांनाही मागणी कमी झाली अन् त्यांनाही घरघर लागली. त्यांचा चेहराही हरवू लागला. एका पिढीची बोहाड्यांची परंपरा पुढच्या पिढीकडे जात नसल्याने हा बोहाड्यांसह मुखवट्यांचा वारसा लुप्त होईल, अशीच अवस्था नाशिक जिल्ह्यातील गावांमधून दिसते. जे काही अस्तित्व शिल्लक आहे ते बोहाडे करणाऱ्या गावांमुळे. त्यामुळे या कलाकारांना कसलं कलेचं आरक्षण अथवा अनुदान नको आहे तर बोहाडे, सोंग बंद केलेल्या गावांनी ते पुन्हा सुरू केले तर एक कला अन् मनोरंजनाचा एक अनोखा आनंद नवीन पिढीतही रूजविला जाईल, एवढीच अपेक्षा ते कलाकार व्यक्त करतात.
बोहाड्यांच्या मुखवट्यामागे मोठा इतिहास, संस्कृती अन् परंपरा आहे. हा इतिहास लुप्त होण्याच्या मार्गावर आहे. तो वाचविण्यासाठी चाचडगावातील कलाकारांना पुन्हा नव्याने उभारी देण्याची गरज निर्माण होताना दिसते. नाहीतर मुखवट्यांचा अज्ञातातून अज्ञाताकडील हा प्रवास अज्ञात राहू नये म्हणून या वेशीवरच्या पाऊलखुणांची नोंद आपण सर्वांनीच घ्यायला हवी.
ठाणापाड्याची तीन उध्वस्त मंदिरे :-
नासिकच्या हलसुल तालुक्यातील ठाणापाडा गावची ओळख म्हणजे तिथला इतिहासप्रसिद्ध खैराईचा किल्ला. कोणे एके काळी हा प्रसिद्ध अशा रामनगर साम्राज्याचा भाग होता. छत्रपती शिवाजी महाराजांनी त्यांच्या उत्तर काळात हा किल्ला जिंकून घेतल्याचे उल्लेख आहेत, त्याला त्यांनी भेटही दिली होती. त्यांची पहिली सूरतेची स्वारी याच प्रांतातून झाली आहे. गडावर अजूनही चहूबाजूंनी भक्कम तटबंदी आहे. दोन तोफा ज्या उन वार्याच्या भरवशावर पडलेल्या आहेत. त्यातल्या एका तोफेवर काहीशी देवनागरी अक्षरे दिसतात. ती खालच्या बाजूला असल्याने वाचता येत नाहीत. छत्रपती शिवाजी महाराजांनी परकीय जोखडातून स्वराज्याचा रथ हाकताना या परिसराचे महत्व ओळखले होते. गूजरातच्या सीमावर्ती भागात असलेला किल्ला त्यांनी जिंकून घेतला होता. पूर्व काळात दळणवळणा बरोबरच या भागातून व्यापार उद्यम होत असणार यात शंका नाही. खैराई सारखा टूमदार वनदुर्ग पाहून त्याची प्रचिती येते. नासिक ते ठाणापाडा हे एका बाजूने ७० किलो मीटरचे अंतर. गिरणारे सोडलं की पुढून सगळा प्रवास हा डोंगराळ भागातला.! वाघेरा किल्ल्याला लांबून नमस्कार करून वाघारे घाटाने हरसूल आणि तिथून ठाणापाडा गाठायचे. खरं तर अवघा ठाणापाडा हे स्वच्छ गाव आहे. रस्त्यावर कुठेच कचरा टाकलेला आढळून येत नाही.
घरांच्या दाटीत आणखी एक मंदिर आहे. या मंदिराचा मुख्य प्रवेशमार्ग अडगळीचे सामान टाकून बंद करण्यात आलेला आहे. केवळ एक अडीच तीन फुटांची जागा आत कचरा फेकण्यासाठी ठेवल्याचे दिसते. आता नेहमीच कचरा फेकला जात असावा. या दुसर्या मंदिराची तीच गत, धत कोसळलेले, याला आठ मजबूत असे उत्तम स्थितीतल कोरीव स्तंभ. गाभार्यात अर्थातच मुर्ती नाही.. एका ठिकाणी एक सुंदरसा कोरीव दगड दिसतो. त्यावर हत्ती आणि व्यालाच्या अगदी बारीक पण अतिशय देखण्या आकृती कोरलेल्य आढळतात. सबंध.गावात रस्त्यावर कुठेच कचरा टाकलेला आढळून येत नाही. मग या मंदिराचा वापर लोक कचरा टाकण्यासाठी का करत असावे? या विचाराने मन सुन्न होते. .
कचर्याने भरलेल्या दोन मंदिरांची स्थिती उत्तम आहे. त्यावरची झाडे वेली तातडीने काढून आतला कचरा साफ करण्याची आवश्यकता आहे. या तिनही मंदिरांचा ताबा विनाविलंब पूरातत्व विभागाने घेण्याची अवश्यकता आहे. ग्रामपंचायतीच्या मदतीने अगोदर कचरा कुंडी बंद करून तिथल्या लोकांना कचरा टाकण्याची व्यवस्था करून द्यावी. या मंदिरा भोवतीची घरे अन्यत्र उठवून मंदिरांचा परिसर मोकळा करण्याची आवश्यकता आहे. इथल्या रहिवाशांना नव्या ठिकाणी घरांना जागा दिली तर युद्ध पातळीवर या मंदिरांचा परिसर मोकळा करता येईल. त्यानंतर मंदिराचे दगड गोळा करून एक ठिकाणी आणावेत आणि मग त्यांच्या जिर्णोद्दाराचा कार्यक्रम हाती घ्यावा. हा परिसर बराच काळ जव्हार किंवा रामनगर राज्याचा भाग असावा. मोगलाईचा वरवंटा येथे फिरलेला असणार हे मंदिराची भग्न दशा पाहून स्पष्ट होते. परिसरातील नागरिकांनी यास दुजोरा देतात.
दगड खाणींना उपयूक्त
भैरवमय वडनेर
श्रीराम यांच्या पाऊलखुणा असलेल्या 294 तीर्थापैकी 155 वे तीर्थ
(श्री रामेश्वर मंदिर,पाटोदा,येवला,नाशिक )
हिंगलाज माता मंदिर
(खेडे-उगाव),निफाड,नाशिक
श्री मतोबा महाराज मंदिर (नैताळे,निफाड,नाशिक)
मार्कंड ऋषी मंदिर, मार्कंड पिंपरी
नाशिक जिल्ह्यातील कळवण तालुक्यात साधारणपणे १६ किलोमीटरवर वसलेल्या मार्कंड पिंपरी ह्या गावात हे पुरातन हेमाडपंथी शिवमंदिर आहे. मार्कंड पिंपरी हे गाव नाशिकपासून जवळजवळ ६२ किमी दूर आहे आणि कळवण पासून १६ किमी अंतरावर आहे. श्री सप्तश्रृंगी गडाच्या पायथ्याशी असलेल्या नांदुरी गावापासून हे गावं अवघ्या ५ किलोमीटर अंतरावर आहे. दक्षिणेला मार्कंड ऋषींच्या तपश्चर्याने पावन झालेला मार्कंड गड तर पश्चिमेला श्री सप्तशृंगीगड ह्या दोन उंच गडांच्या मधोमध हे सुंदर गावं निसर्गाच्या कुशीत वसलेले आहे. गावात मार्कंड ऋषींचे पुरातन मंदिर आहे. तसेच गावचे वैभव असणारे एक शिवमंदिर पूर्वी गावात होते. आजमितीस मात्र या मंदिराच्या केवळ खाणाखुणा शिल्लक आहेत.
हे मंदिर हेमाडपंती शैलीचे आहे आणि गाभाऱ्यात भगवान शिव ची मूर्ती असल्यामुळे ह्या मंदिराला हेमाडपंती शिवमंदिर म्हणून संबोधले जाते. सप्तशृंगी गड आणि मार्कंडे ऋषी गड ह्या दोन उंच गडांच्या मधोमध हे सुंदर, दुर्मिळ आणि मोडकळीस आलेले हे हेमाडपंथी शिवमंदिर निसर्गाच्या कुशीत वसलेले आहे. स्थानिक लोक, पर्यटक, आणि सरकार यांनी दुर्लक्ष केल्यामुळे मंदिर बहुतांशी उद्ध्वस्त झाले आहे. हे मंदिर भगवान शंकर यांचे परम भक्त आणि 'महामृत्युंजय मंत्राचे' जनक मानल्या जाणाऱ्या मार्कंडेय ऋषींना समर्पित आहे. पौराणिक कथेनुसार, मार्कंडेय ऋषींनी याच परिसरात तपश्चर्या केली होती. गोदावरी नदीच्या काठावर असल्यामुळे या ठिकाणचे वातावरण अतिशय शांत आणि प्रसन्न आहे. विशेषतः महाशिवरात्री आणि ऋषीपंचमीला येथे भाविकांची मोठी गर्दी असते.
पौराणिक कथेनुसार, मार्कंडेय ऋषी हे भगवान शंकराचे परम भक्त होते. त्यांचे आयुष्य केवळ १६ वर्षांचे होते, परंतु त्यांनी याच परिसरात कठोर तपश्चर्या करून भगवान शंकराला प्रसन्न केले आणि मृत्यूवर विजय मिळवून अमरत्वाचे (चिरंजीवी) वरदान प्राप्त केले.
महामृत्युंजय मंत्र: असे मानले जाते की, मार्कंडेय ऋषींनी याच पवित्र भूमीवर 'महामृत्युंजय मंत्राची' रचना केली, जो आजही मृत्यूच्या भयापासून मुक्ती मिळवण्यासाठी सर्वात प्रभावी मानला जातो.
ग्रंथसंपदा: त्यांनी सप्तशृंगी देवीच्या दिशेने तोंड करून या पर्वतावर बसून 'दुर्गाशक्ती' (सप्तशतीचा भाग) हा ग्रंथ लिहिल्याचे सांगितले जाते.
हेमाडपंथी शैलीचे दोन शिवमंदिर कळवण तालुक्यात पाहायला मिळतात. एक म्हणजे देवळीकराड या गावामध्ये आहे तर दुसरं मार्कंड पिंपरी येथे आहे. कळवण तालुका हा इतिहासपूर्ण तालुका आहे, असे म्हणतात कि, ज्यावेळेस छत्रपती शिवाजी महाराज सुरतेच्या लढाईसाठी जात होते तेव्हा ते या शिवमंदिरात दर्शनासाठी आले होते. या प्राचीन मंदिराच्या दर्शनासाठी जातांना गावाच्या सुरुवातीला एक कमान लागते, त्या कमानीवर मंदिराचे नाव रंगवले आहे त्यामुळे वळण घेणे सोयीस्कर जाते. एक चांगली गोष्ट म्हणजे, ह्या मंदिराच्या दर्शनासाठी वाहनाने जाऊ शकता.
आपण खूप भाग्यवान आहोत कि, या इतिहासकालीन पुरातन वास्तूंचा वारसा निसर्गाने आपल्याकडे ठेवा म्हणून दिला आहे. अशा या इतिहासकालीन पुरातन वास्तू जपल्या पाहिजेत, त्यांचं संगोपन केलं पाहिजे जेणेकरून येणाऱ्या पुढच्या सर्व पिढ्यांना ह्या पुरातन वास्तूंचा इतिहास माहिती झाला पाहिजे, नाहीतर काळाच्या ओघात हे सर्व त्यांच्या इतिहासासोबतच नामशेष होऊन जाईल.
लासलगावचा भुईकोट :-
लासलगावला आज जसे महत्व आहे तसेच महत्व याला मुघलांच्या,मराठ्यांच्या व इंग्रज काळात होते. लासलगाव हे नाव येथे चालणाऱ्या लसणाच्या व्यापारामुळे पडल्याचा उल्लेख पेशवे दप्तरात येतो. लासलगावच्या उत्तरेला आहिल्याबाई होळकर साम्राज्याची उपराजधानी चांदवड तर दक्षिण बाजुला सरदार विंचुरकरांचे विंचुर संस्थान.


(फोटो: आण्णासाहेब डांगे यांचे सौजन्य)

(फोटो: आण्णासाहेब डांगे यांचे सौजन्य)

(फोटो: आण्णासाहेब डांगे यांचे सौजन्य)
सन १७९१ ला यशवंतराव फणसे यांच्या अकस्मिक निधनानंतर मुक्ताबाई किल्ले महेश्वर येथे सती गेल्या. यशवंतरावांचे पाचवे वंशज गणपतराव रेवजी फणसे यांच्याकडे लासलगावच्या किल्ल्याचा कारभार होता. सन १८३५ रोजी इंदूर येथील होळकरांचे तत्कालीन महाराज हरीराव महाराजांच्या विरोधात त्यांनीच नेमलेल्या फणशेच्या सरदाराने बंड केले. होळकर महालात फणशांचे गारदी घुसले. परंतू त्यांचे नियोजन फसले आणि हरिरावांच्या सैनिकांनी गारद्यांची कत्तल केली. या बंडाचे नेतृत्व करणार्या राजाभाऊ फणसे यांना हरीराव महाराजांचा वारसदार तुकोजीराव(दुसरे) यांनी ठार केले. या घटनेमुळे लासलगावच्या किल्ल्याचा कारभार सांभाळणारे त्यांचे बंधू गणपतराव सैरभैर झाले.आपली काही धडगत नाही, शिवाय इंग्रज सरकार या घटनेचा फायदा घेऊन आपल्यावर कारवाई करून आपल्यावर जप्ती आणतील या आशंकेतून गणपतरावांनी लासलगावचा किल्ला राजस्थान येथून आलेले व्यापारी शिवराज आब्बड यांनी एक हजार 300 रुपये भरणा करत किल्ल्याचे मालकीहक्क विकत घेतले. त्यानंतर 1969 मध्ये या किल्ल्याची मालकी आब्बड कुटुंबाला दिली गेली. त्यामुळे आज हा किल्ला खाजगी मालकीची संपत्ती आहे.आजही पंचक्रोशीमध्ये या कुटुंबाला "किल्लेवाले' या नावाने ओळखले जाते.
नाशिक जिल्ह्यातील निफाड तालुक्यात असलेला हा भुईकोट नाशिक शहरापासुन ५६ कि.मी.अंतरावर तर निफाड या तालुक्याच्या ठिकाणापासून २० कि.मी.अंतरावर आहे. लासलगाव शहर शिव नदीच्या काठावर वसलेले असुन कधीकाळी या संपुर्ण गावाला दगडी तटबंदी व सात वेशी होत्या व त्याच्या आत सध्याचा बालेकिल्ला होता. तटबंदीचे काही अवशेष आजही आपल्याला पाहवयास मिळतात व सात वेशी पैकी आज फक्त एकच वेश नजरेस पडते. त्या वेशी वर श्रीराम मंदिर ट्रस्ट असे लिहिलेले आहे. वेस आजही चांगल्या स्थितीत असून जांग्या व पाकळी कलाकृती वरील बाजूस बघायला मिळते. या वेशीवरून पूर्वीच्या संपूर्ण तटबंदीचा घेरा केवढा असेल याचा अंदाज येतो. तटबंदी मध्ये पाषाण व विटांचा वापर केलेला दिसतो. आज हि तटबंदी पुर्णपणे नष्ट झाली असुन यातील केवळ दोन बुरुज व त्यातील पश्चिमाभिमुख दरवाजा शिल्लक आहे. कोटाचा हा दरवाजा राम मंदिराजवळ असुन या दरवाजाच्या आत दोन्ही बाजुस पहारेकऱ्याच्या देवड्या आहेत. या दरवाजापासून साधारण २५० फुट अंतरावर लासलगाव किल्ला उभा आहे. सव्वा एकरवर पसरलेला हा किल्ला आजही सुस्थितीत असुन त्याच्या तटबंदीत एकुण आठ बुरुज आहेत.








दाराच्या चोकटीची भव्यता व नक्षीकाम वाखण्याजोगे आहे






किल्ल्याच्या आत वीटकामाची व दगडीकामांची सुंदर सज्जे असलेली भक्कम तटबंदी आहे, ध्वजारोहणाकरिता जागा असून, आजही ही जागा शाबूत आहे.
हा किल्ला लष्करी दृष्टिकोन ठेऊन बांधला असल्यामुळे स्वतःच्या संरक्षणाची पण होळकरांनी खबरदारी घेतलेली दिसते. या किल्ल्यात भुयारी मार्ग नजरेस पडतात. या भुयारी मार्गाच्या अनेक शाखा आहेत त्यातील काही भुयार हे येथून २० कि.मी अंतरावर असणाऱ्या चांदवडच्या होळकर वाड्यात निघतात व काही निफाडच्या होळकर वाड्यात व काही येथून काही अंतरावर असलेल्या होळकर वस्तीवर. होळकर वस्तीवर असलेल भुयार नष्ट होण्याच्या मार्गावर आहे. जिवीतास धोका असल्याचे कारण तेथील स्थानिक लोक देतात. जीवितास धोका आहे म्हणून एखादा ऐतिहासिक वारसा नष्ट करायचा हा एकमेवच पर्याय आपल्याकडे आहे का?
वीटकामाची व दगडी कामाची सुंदर सज्जे असलेली तटबंदी मजबूत आहेत. सध्या किल्ल्यात खाजगी मालकाचे सहा ते सात कुटुंब राहत आहेत. काही तटबंदीवर आतल्या बाजूने अजूनही चुनेगच्ची पद्धतीची कलात्मक नक्षी शिल्लक आहे, नक्षीमध्ये चिन्हे दिसून येतात. ध्वजारोहनची जागा हि आजच्या घडीला व्यवस्थित असून, ध्वज खांबावर भगवा फडकताना दिसतो.
तटबंदी पाहुन मुख्य दरवाजात आल्यावर आपली गडफेरी पुर्ण होते. किल्ल्याभोवती फेरी मारताना दक्षिणेकडील तटबंदीत एक लहान दरवाजा पहायला मिळतो जो आता दगडांनी चिणून बंद केला आहे. तटबंदीला लागुन पत्रे ठोकून या जागेवर कब्जा करण्याचे काम सुरु झाले आहे जे वेळेवर थांबविणे गरजेचे आहे.
लासलगावची शान असलेल्या या भुईकोट किल्ल्यात आज आब्बड कुटुंबीयांची पाचवी पिढी आनंदाने राहत आहे. आजही सायंकाळी सातला मुख्य दरवाजा बंद केला जातो, तर सकाळी साडेसहाला उघडला जातो. त्या काळातील किल्ल्यातील पीरबाबांचे स्थान आजही असून, गुरुवारी त्याची विधिवत पूजा केली जाते.
लाखलगावातील ऐतिहासिक मंदिरातील शिलालेखां :-
माधवराव पेशवे यांचे साडू सरदार अप्पाजी गणेश वैद्य यांना १७७२ मध्ये गावातील वैद्य वाडा जहागिरीमध्ये मिळाल्याचे गावातील त्यांचे वंशज सुरेश वैद्य सांगतात. इथे त्यांनी मंदिरे बांधली. गावाला साठ बिगे जमीन दिली. अप्पाजी वैद्य हे अहमदाबादला सुभेदार होते. पेशव्यांनी त्यांना लखनाबादची जहागिरी दिली होती. अहमदाबादहून येताना त्यांनी संपत्ती आणली होती. १७७२ च्या दरम्यान, अप्पाजी लखनाबादला आले. अप्पाजी वास्तूशास्त्राचे अभ्यासक असल्याने त्यांनी नवीन लाखलगावची रचना वास्तूशास्त्राप्रमाणे केली. सुरक्षेसाठी तटबंदीचा कोट गावाभोवती उभारली. त्याला चार वेशी आहेत.
अप्पाजी यांचा मुलगा सरदार अमृतराव वैद्य हे लढवय्ये होते. कल्याणचा सुभा लुटताना सैन्यात चांगली कामगिरी केल्याने त्यांना जहागिरी मिळाली. अमृतराव यांचा मुलगा माधवराव व माधवराव यांचा मुलगा अप्पाजी धार्मिक वृत्तीचे होते, अप्पाजी गणेश वैद्य थोरल्या माधवराव पेशव्यांचे सख्खे साडू होते. ते पूर्वी अहमदाबादला सुभेदार होते. पेशव्यांनी त्यांना लाखलगावची जहागिरी दिली. त्यांचा वाडा आजही पाहता येतो
लाखलगाव-रामाचे हे गाव. ऐतिहासिक गाव अशी ओळख असलेल्या गोदाकाठावरील लाखलगावातील नदीकाठच्या घाटावर व सिद्धेश्वर मंदिराच्या गाभाऱ्यात देवनागरीतील शिलालेख आहेत. मात्र, आतापर्यंत वाचनच न झाल्याने त्यांच्याबाबत उलगडा होत नव्हता.
पुण्यातील वीरगळ अभ्यासक अनिल दुधाणे यांनी त्याचा अभ्यास केला. शिलालेखाची भाषा उठाव स्वरुपातील देवनागरी आहे. वास्तूशास्त्राचे अभ्यासक अप्पाजी गणेश वैद्य यांचा गावातील हा इतिहास थक्क करणारा आहे. दक्षिण-उत्तर वाहणाऱ्या गोदावरीच्या बाजूला महादेव, सिद्धेश्वर, संत जनार्दन स्वामी, खंडेराव, लक्ष्मी माता, मारुती, वेताळ बाबा, शंकर अशी मंदिरे आहेत. मंदिरालगतच्या समाधी लक्ष वेधतात. ओतूरच्या श्री संत सदगुरू दिगंबर बापू महाराज यांची ही तपोभूमी आहे. त्यांची समाधी आहे. त्यांनी गावातील रामाचे मंदिर स्थापन केले. शनी मंदिराच्या बाजूला असलेल्या सिद्धेश्वर मंदिरात संत जनार्दन स्वामींचे वास्तव्य होते. नदीवरील घाटाच्या पायऱ्यांमध्ये विविध मूर्तींसह शिलालेख आहे. लाखलगावात दोन्ही शिलालेख घाट व मंदिर बांधणाऱ्या व्यक्तींची स्मृती जपण्यासाठी कोरल्याचे स्पष्ट झाले आहे. लक्ष्मण कृष्णा, शिवराम कृष्णा फाटक आणि वैद्य यांचे संबंध नेमके काय होते, याचा उलगडा होण्यास हे शिलालेख इतिहास अभ्यासकांना उपयुक्त ठरतील,
शिलालेख कोरीव असून सात ओळींचा मजकूर त्यावर लिहिलेला आहे. शिलालेखास रंग नसल्याने आणि पाण्याच्या प्रवाहामुळे अक्षरे स्पष्ट दिसत नाही. छत्रपती थोरले शाहू महाराज (सातारा) आणि पेशवे बाळाजी विश्वनाथ यांच्या कारकिर्दीत हा घाट बांधला गेला. शिलालेखामध्ये लक्ष्मण कृष्णा, शिवराम कृष्णा फाटक अशी नावे आहेत. या दोघांनी त्यांच्या संपत्तीच्या हिश्यातून शके १६६३ मध्ये हा घाट बांधल्याचा उल्लेख आढळतो.
पहिला शिलालेख
लाखलगावच्या
घाटावरील हा शिलालेख रामाच्या लाखलगावातील गोदातीरावरील घाटाच्या भिंतीत
एका शिळेवर बसविलेला आहे. शिलालेख कोरीव स्वरूपात सात ओळींचा असून, शुद्ध
मराठीत आहे. शिलालेखास रंग मारल्याने, तसेच पाण्याच्या प्रवाहामुळे अक्षरे
पुसट झाली आहेत. शिलालेख असा :
१. शके १६६३ दुर्मती
२. नाम सवत्सरे मार्ग-
३. शीर्ष सुध १ तदि-
४. ने श्री गंगा चरणी ल-
५. क्ष्मण कृष्णा तत्पर शि-
६. वराम कृष्णा फाटक
७. निरंतर श्रुभवतु(न)
शिलालेखाचा अर्थ : शालिवाहन शकाच्या शके १६६३ व्या वर्षी दुर्मती नाम संवत्सरात गंगा (गोदावरी) चरणी तत्पर असलेले श्री लक्ष्मण कृष्णा, शिवराम कृष्णा फाटक यांनी गोदावरी नदीच्या तीरी मार्गेश्वर वद्य १च्या दिवशी म्हणजेच २८ नोव्हेंबर १७४१ शनिवार रोजी घाट बांधला.
सिद्धेश्वर मंदिरावर दुसरा शिलालेख
लाखलगावातील
दुसरा शिलालेख घाटावरील सिद्धेश्वर मंदिराच्या गाभाऱ्याच्या बाजूच्या
भिंतीवर कोरलेला आहे. हा शिलालेख चार ओळींचा असून, देवनागरीत व उठावदार
पद्धतीचा आहे. शिलालेख असा :
१. श्री शके १६६३ दुर्मती नाम सवत्स
२. रे शुद्ध १४ तद्दिनी शिधेश्व
३. र चरनी शिवराम कृष्णा तत्पर लक्ष्म
४. ण निरंतर
शिलालेखाचा अर्थ : मंदिराच्या बांधणीसंदर्भातील या शिलालेखात शिवराम कृष्णा व लक्ष्मण कृष्णा फाटक यांनी शके १६६३ मध्ये सिद्धेश्वर मंदिर बांधल्याचे म्हटले आहे.
दिंडींचा कळस म्हणजे पळस!
‘पळस पळस त्याने केला दिंडीचा कळस’ असे ज्या गावाच्या नावावरून म्हटलं जातं ते गाव म्हणजे नाशिक-पुणे महामार्गावरील दारणानदी कुशीत वसलेले पळसे हे गाव. पळसे अन् नाशिकला जोडणारा ब्रिटिशकालीन पूल १९०५ मध्ये बांधला गेला अन् पळसेचा विकास झपाट्याने होऊ लागला. त्र्यंबकेश्वरमधील संत निवृत्ती महाराजांची पालखी पंढरपूरला जाताना पळसे गावात मुक्काम करते. त्यामुळे दिंडीची मोठी परंपरा पळसे पुढे घेऊन जाताना दिसते. गावात पूर्वी पळसाची झाडे खूप असतील म्हणून गावाला पळसे हे नाव पडले असेल, असे धोंडीराम गायधनी, बबनराव थेटे, संजय डहाळे, विष्णू गायखे सांगतात. गावात प्रवेश केला की, डाव्या हाताला वेस अन् वेशीबाहेर नव्याने बांधलेली ग्रामपंचायत इमारत लागते. पूर्वी पळसे गावात साठे नावाचे लोकच सर्वाधिक होते. आताही साठे नावाचे काही कुटुंबं गावात राहतात. पेशवेकालीन वाडेही बरेच होते. यात पद्मिनिचा वाडा, पाटील वाडा पहायला मिळतो. पद्ममिनिचा वाडा सहा खणी आहे, असे भरत गायधनी सांगतात. वाडा पाहून जुन्या शाळेतील संत आईसाहेबांच्या समाधीकडे जायचे. दगडी छत्रीसारखी समाधी व त्या आजूबाजूला लहान मोठ्या समाधी पाहताना पळसे गावाचा संत परंपरेचा उलगडा होतो. पळसेकर महाराजांचे वास्तवही पळसे गावाला लाभल्याचे ग्रामस्थ सांगतात. तशीच गावात डाव्या विचारांची चळवळही रूजली होती.
गावात विठ्ठल मंदिर, मुंजाबा, हनुमान मंदिर, खंडोबा व शितळा माता मंदिर व इतरही लहान मोठी मंदिरे आहेत. हनुमान मंदिरासमोर सहा फूटाची स्तंभ दीपमाळ आहे. आषाढी एकादशीला गावात यात्रा भरते. पालखीचा सोहळा यावेळी पार पडतो, असे देवीदास गायधनी व सुधाकर जाधव सांगतात. तर आदिकमासात ग्रामस्थ महिनाभर नदीवर आंघोळीला जाण्याची प्रथा आहे. महामार्गापलीकडे भैरवनाथाचे मंदिर व गोसाव्याची समाधी आहे. येथेच मरीआई, खोकलाई, साती आसरा आहेत, असे सुदाम जाधव सांगतात. एक गंमत म्हणजे गावातील ‘बाराशे’ नावाचा एक कुत्रा खूप प्रसिद्धीस आला आहे. तो गावातील प्रत्येक अंत्ययात्रेत सहभागी होतो. या कुत्र्याचा अपघात झाला असताना त्याच्यावर बाराशे रूपये खर्च आल्याने त्याला बाराशे असे नाव पडल्याचे संजय डहाळे सांगतात. पळसेकरांनी लग्नातील एक विशेष परंपरा आजही जपली आहे. ती म्हणजे लग्नात जात्यावर दळण पुरूष मंडळी करतात व लोकगीते गातात. हू प्रथा गेल्या अनेक वर्षांपासून सुरू असल्याचे ग्रामस्थ सांगतात. कधीकाळी कुस्ती अन् कबड्डीत हातखंडा आजमावणारे पळसे हे गाव प्रगतीशील शेतीच्या माध्यमातून विकासाकडे झेपावत असल्याचे पहायला मिळते. वेशीतून समोरच्या रस्त्याने गावाबाहेर पडताना रस्त्यात डाव्या हाताला आहिल्याबाईंची बारव वाईट अवस्थेत पहुडल्याचे पहायला मिळते. हा ऐतिहासिक वारसा जपला गेल्यास पळसेवर आणखी एक कळस नक्कीच चढेल, असे वाटायला लागते.
पोलिसांचं जामगाव अन् पास्ते
वडगाव पिंगळातून जामकडे जाणारा रस्ता हा एक आनंद देणारा घाट आहे. घाटातील पवनचक्क्या पाहत सात-आठ किलोमीटर गेल्यावर आपण जाम गावात पोहचतो. लांबूनच हनुमान मंदिराचा कमळाच्या पाकळ्यांसारखे दिसणारे शिखर ओढ वाढवतो. वडगाव पिंगळा सारखचं लाकडी बांधणीतील दुमजली हनुमान मंदिर जाम गावातही आहे. कौलारू छत, त्यावरील हनुमानाची चित्रे, लाकडीकाम व हनुमानाची सुंदर मूर्ती पहायला मिळते. गावात काशीआई, भवानी, खंडोबा मंदिरेही आहेत. सर्व मंदिरे नव्याने बांधलेली आहेत. गावात दरवर्षी काशीआईचा उत्सव होतो. साठ-सत्तर उंबऱ्यांचं जाम प्रसिद्ध आहे ते पोलिसांसाठी. प्रत्येक घरातील एकजण पोलिस दलात सेवेत आहे. तर गावातील काशीनाथ बोडके यांची नात प्रियंका कीर्तनकार म्हणून जाम गावाला वेगळेपण मिळवून देत आहे, अशी माहिती प्रभाकर सांगळे व नितीन बोडके यांनी दिली. जाम गावातून पुढे तीन-चार किलोमीटरवर पास्ते हे गाव लागतं. पास्ते देवनदीच्या किनारी वसलं आहे. पास्ते नावाबाबत काहीच माहित नसल्याचे ग्रामस्थ सांगतात. गेल्या अनेक पिढ्या गावाला हेच नाव असल्याचे बाळू आव्हाड व चंदू घुगे सांगतात. या गावात प्रवेश करताना शिवमंदिर, हनुमान मंदिर पहायला मिळतं. हनुमान मंदिरात विठ्ठल व गणपती मंदिर आहे. ही सर्व मंदिरे नव्याने बांधलेली आहेत. गावातील बहुतांश घरातील मुले पोलिस दलात आहेत.
पास्ते गावात दुमली जुनी घरे पहायला मिळतात. पास्ते हे राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाडांचे गाव म्हणूनही ओळखले जाते. जाम गावातून खापराळे गावाकडे जाताना चंद्रपूर हे गाव लागतं. गाव म्हणावं असं तीस-चाळीस घरांचा छोटासा पुंजका चंद्रकोरीतून डोकावताना दिसतो. आजूबाजूला मोकळ रानमाळ, सुसाट वारा अन् यात खेळताना दिसणाऱ्या पवनचक्या एवढं या गावाचं वर्णन डोळ्यापुढं उभं राहतं. गावाच्या आधी एक वीरगळ चंद्रपुरात स्वागत करते अन् गाव पाहता पाहता संपतेही. हा छोटासा आदिवासी पाडा ओलांडून आपण खापराळी या गावाकडे झेपावतो. खापराळी गावातील जवळपास सगळ्याच घरांची छपरं खापराची आहेत. हे गाव दूध व दह्यासाठी प्रसिद्ध आहे. खापराळीच्या डोंगरात भवानी मातेचं मंदिर आहे. या मंदिरात जाण्यासाठी डोंगरात वरपर्यंत गाडी जाते. नव्याने बांधलेले मंदिरातून समोर घोटी-सिन्नर रस्ता दिसतो. हा नजारा पाहून पुन्हा नाशिककडे निघायचं. खापराळी, चंद्रपूर, जाम, वडगाव पिंगळा अन् दारणा ओलांडण्यापूर्वी पुन्हा नाशिकमध्ये दाखल होण्यापूर्वी पळसे हे गाव लागतं.
https://www.facebook.com/photo/?fbid=5010705585822962&set=pcb.5010706415822879
हेमाडपंथी शिवमंदिर: मार्कंड पिंपरी
| हेमाडपंथी शिवमंदिर |
हे पुरातन हेमाडपंथी शिवमंदिर नाशिक जिल्ह्यातील कळवण तालुक्यात मार्कंड पिंपरी ह्या गावात आहे. मार्कंड पिंपरी हे गाव नाशिकपासून जवळजवळ ६२ किमी दूर आहे आणि कळवण पासून १६ किमी अंतरावर आहे. हे मंदिर हेमाडपंती शैलीचे आहे आणि गाभाऱ्यात भगवान शिव ची मूर्ती असल्यामुळे ह्या मंदिराला हेमाडपंती शिवमंदिर म्हणून संबोधले जाते. सप्तशृंगी गड आणि मार्कंडे ऋषी गड ह्या दोन उंच गडांच्या मधोमध हे सुंदर, दुर्मिळ आणि मोडकळीस आलेले हे हेमाडपंथी शिवमंदिर निसर्गाच्या कुशीत वसलेले आहे. स्थानिक लोक, पर्यटक, आणि सरकार यांनी दुर्लक्ष केल्यामुळे मंदिर बहुतांशी उद्ध्वस्त झाले आहे.
असे हेमाडपंथी शैलीचे दोन शिवमंदिर कळवण तालुक्यात पाहायला मिळतात. एक म्हणजे देवळीकराड या गावामध्ये आहे तर दुसरं मार्कंड पिंपरी येथे आहे. कळवण तालुका हा इतिहासपूर्ण तालुका आहे, असे म्हणतात कि, ज्यावेळेस छत्रपती शिवाजी महाराज सुरतेच्या लढाईसाठी जात होते तेव्हा ते या शिवमंदिरात दर्शनासाठी आले होते. या प्राचीन मंदिराच्या दर्शनासाठी जातांना गावाच्या सुरुवातीला एक कमान लागते, त्या कमानीवर मंदिराचे नाव रंगवले आहे त्यामुळे वळण घेणे सोयीस्कर जाते. एक चांगली गोष्ट म्हणजे, ह्या मंदिराच्या दर्शनासाठी वाहनाने जाऊ शकता.
मार्कंड ऋषी मंदिर, मार्कंड पिंपरी | Markand Rishi Temple | Discover Maharashtra
नाशिक जिल्ह्यातील कळवण पासून साधारणपणे १६ किलोमीटरवर वसलेले मार्कंड पिंपरी हे छोटसं गावं. श्री सप्तश्रृंगी गडाच्या पायथ्याशी असलेल्या नांदुरी गावापासून हे गावं अवघ्या ५ किलोमीटर अंतरावर आहे. दक्षिणेला मार्कंड ऋषींच्या तपश्चर्याने पावन झालेला मार्कंड गड तर पश्चिमेला श्री सप्तशृंगीगड ह्या दोन उंच गडांच्या मधोमध हे सुंदर गावं निसर्गाच्या कुशीत वसलेले आहे. गावात मार्कंड ऋषींचे पुरातन मंदिर आहे. तसेच गावचे वैभव असणारे एक शिवमंदिर पूर्वी गावात होते. आजमितीस मात्र या मंदिराच्या केवळ खाणाखुणा शिल्लक आहेत.Markand Rishi Temple, Markand Pimpri.
नामशेष झालेल्या शिवमंदिराचे अवशेष आपल्याला परिसरात विखुरलेले दिसतात. मंदिरातील शिवलिंग जवळच ठेवलेले असून त्यावर ग्रामस्थ आता नव्याने मंदिराचे बांधकाम करीत आहेत. मंदिराच्या परिसरात अजून एक छोटेखानी पुरातन मंदिर असून मार्कंड ऋषींच्या माता पित्यांचे हे मंदिर असल्याचे ग्रामस्थ सांगतात. या मंदिराची देखील आता पडझड होत आहे. मंदिराच्या आवारातून मार्कंडेश्वर पर्वत आणि सप्तशृंगी गडाचं मनमोहक रूप दिसतं.
नामशेष झालेल्या मंदिराचे अवशेष पाहिल्यानंतर आपल्या मनाला अतीव वेदना होतात. आपण खूप भाग्यवान आहोत कि, या इतिहासकालीन पुरातन वास्तूंचा वारसा पूर्वजांनी आपल्याकडे ठेवा म्हणून दिला आहे. अशा या इतिहासकालीन पुरातन वास्तू जपल्या पाहिजेत, त्यांचं संगोपन केलं पाहिजे. जेणेकरून येणाऱ्या पुढच्या पिढ्यांना ह्या पुरातन वास्तूंचा इतिहास समजेल, नाहीतर काळाच्या ओघात हे सर्व त्यांच्या इतिहासासोबतच नामशेष होऊन जाईल.
रोहन गाडेकर
नाशिक जिल्ह्यातील पिंपरी मार्कंड येथील मार्कंडेय ऋषी मंदिर आणि मार्कंडेय पर्वत (किल्ला)हे एक अत्यंत प्राचीन, ऐतिहासिक आणि पवित्र स्थान आहे.
हे मंदिर नाशिक जिल्ह्यातील पिंपरी मार्कंड या गावी वसलेले आहे. हे मंदिर भगवान शंकर यांचे परम भक्त आणि 'महामृत्युंजय मंत्राचे' जनक मानल्या जाणाऱ्या मार्कंडेय ऋषींना समर्पित आहे. पौराणिक कथेनुसार, मार्कंडेय ऋषींनी याच परिसरात तपश्चर्या केली होती. गोदावरी नदीच्या काठावर असल्यामुळे या ठिकाणचे वातावरण अतिशय शांत आणि प्रसन्न आहे. विशेषतः महाशिवरात्री आणि ऋषीपंचमीला येथे भाविकांची मोठी गर्दी असते.
नाशिक जिल्ह्यातील मार्कंडेय ऋषी मंदिराचा इतिहास प्रामुख्याने पौराणिक कथा आणि ऐतिहासिक किल्ल्याशी जोडलेला आहे.
पौराणिक इतिहास (Legend of Sage Markandeya)
अमरत्वाचे वरदान: पौराणिक कथेनुसार, मार्कंडेय ऋषी हे भगवान शंकराचे परम भक्त होते. त्यांचे आयुष्य केवळ १६ वर्षांचे होते, परंतु त्यांनी याच परिसरात कठोर तपश्चर्या करून भगवान शंकराला प्रसन्न केले आणि मृत्यूवर विजय मिळवून अमरत्वाचे (चिरंजीवी) वरदान प्राप्त केले.
महामृत्युंजय मंत्र: असे मानले जाते की, मार्कंडेय ऋषींनी याच पवित्र भूमीवर 'महामृत्युंजय मंत्राची' रचना केली, जो आजही मृत्यूच्या भयापासून मुक्ती मिळवण्यासाठी सर्वात प्रभावी मानला जातो.
ग्रंथसंपदा: त्यांनी सप्तशृंगी देवीच्या दिशेने तोंड करून या पर्वतावर बसून 'दुर्गाशक्ती' (सप्तशतीचा भाग) हा ग्रंथ लिहिल्याचे सांगितले जाते.
ऐतिहासिक महत्त्व (Historical Significance)
मार्कंडेय किल्ला: हे मंदिर ज्या डोंगरावर आहे, त्याला 'मार्कंडेय किल्ला' म्हणून ओळखले जाते. हा किल्ला समुद्रसपाटीपासून साधारण ४,३८४ फूट (१,३३६ मीटर) उंचीवर आहे. मराठा आणि मुघल काळ: ऐतिहासिक नोंदींनुसार, १६७० मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी सुरतेच्या लुटीनंतर परतताना हा किल्ला जिंकला होता. नंतर १७ व्या शतकाच्या अखेरीस तो मुघलांच्या ताब्यात गेला आणि पेशवे काळात पुन्हा मराठ्यांकडे आला.
स्थापत्य: किल्ल्याच्या माथ्यावर मार्कंडेय ऋषींचे एक छोटे मंदिर आहे, जिथे आजही भाविक दर्शनासाठी जातात. गडावर पाण्याचे टाके (कामंडलू तीर्थ) आणि जुन्या वास्तूंचे अवशेष पाहायला मिळतात.
ठाणापाड्याची तीन मंदिरे त्वरीत करावी कचरा मुक्त
| Thanapade temple |
एखाद्या वैभवाची अवदशा होते तेव्हा त्याला, 'काळाचा महिमा' म्हंटलं जातं. इथे माणूस काळाचा फास हातात धरून उभा आहे. इथल्या तीन मंदिरांच्या भोवती त्याने तो आवळला आहे. अगोदर परकीय आक्रमकांच्या रूपाने आणि आता स्वकीय बनून! कोणी तरी जाऊन सांगायला हवं, भारत आता स्वतंत्र झाला आहे, सोडा तो काळाचा फास...करा ती तीन मंदिरे मुक्त. हवं तर नका करू त्यांची डागडूजी किंवा पूनर्निमाण, तिथल्या शिवशंकराची अप्रतिष्ठा करू नका. तिथला बुद्ध, महावीर किंवा जो इष्ट देव असेल त्याला असा कचर्यात लोटू नका. गणपती, देवी-देवता, यक्ष, सूरसुंदर्या, किर्तीमुख, सिंहादींच्या मुर्ती केरापासून मुक्त करा...
नासिकच्या हलसुल तालुक्यातील ठाणापाडा गावची ओळख म्हणजे तिथला इतिहासप्रसिद्ध खैराईचा किल्ला. कोणे एके काळी हा प्रसिद्ध अशा रामनगर साम्राज्याचा भाग होता. छत्रपती शिवाजी महाराजांनी त्यांच्या उत्तर काळात हा किल्ला जिंकून घेतल्याचे उल्लेख आहेत, त्याला त्यांनी भेटही दिली होती. त्यांची पहिली सूरतेची स्वारी याच प्रांतातून झाली आहे. गडावर अजूनही चहूबाजूंनी भक्कम तटबंदी आहे. दोन तोफा ज्या उन वार्याच्या भरवशावर पडलेल्या आहेत. त्यातल्या एका तोफेवर काहीशी देवनागरी अक्षरे दिसतात. ती खालच्या बाजूला असल्याने वाचता येत नाहीत. किल्ल्या प्रमाणेच ठाणापाड्याची ओळख ठरावी अशी ही तीन मंदिरे आज कमालीच्या जिर्णशीर्ण दशेत आहेत. त्यातली दोन बर्यापैकी उभी आहेत. परंतू सांगताना अंगावर शहारे येतात, त्यांचा उपयोग चक्क...कचरा कुंडी म्हणून केला जात आहे. तिसरे मंदिर पूर्णपणे ध्वस्त झाले असून त्याच्या अनेक मुर्ती काळाच्या दयेवर उघड्यावर ऊन वारा खात आहेत.
| lion the symbol of Supreme ruler... |
५ फेब्रुवारी २०२१ या दिवशी ठाणापाड्याला केवळ खैराई किल्ला बघण्यासाठी भेट दिली होती. त्यावेळी ज्याठिकाणी आम्ही आमची गाडी उभी केली होती त्याच ठिकाणी घरांच्या कोंढावळ्यात ही मंदिरे निघाली. तेव्हा किल्ला बघण्याचा उद्देश होता. म्हणून फार थांबता नव्हते आले. स्थानिकांकडून चौकशी करूनही गावातल्या या वैभवशाली मंदिरांची माहिती मिळाली नव्हती. दूर्गवीर रोहीत जाधव हा तिथे भेट देऊन आला. दीपक पवार आणि दीपक मनोहर अशी आमची छोटेखानी तुकडी दुपारी उशिरा ठाणापाड्याच्या दिशेने निघाली. नासिक ते ठाणापाडा हे एका बाजूने ७० किलो मिटरचे अंतर. गिरणारे सोडलं की पुढून सगळा प्रवास हा डोंगराळ भागातला. वाघेरा किल्ल्याला लांबून नमस्कार करून वाघारे घाटाने हरसूल आणि तिथून ठाणापाडा गाठेस्तोवर दुपारचे साडे चार वाजून गेले. थंडीच्या गारठ्यात चहाची हूक्की येऊनही, 'अगोदर मंदिरे पाहून, मावळतीच्या सूर्य किरणात छान न्हाऊन निघतील तेव्हा त्यांची उत्तम छायाचित्रे टिपू', असा विचार करून आम्ही गावच्या मुख्य बाजारपेठेतल्या मशिदी समोरच्या रस्त्यावर दाखल झालो. हा तसा वर्दळ कमी असलेला भाग. तिथेच गाडी उभी केली तर कळलं, बाजूच्या बोळकांडीतून आत जावं लागेल. बोळ तर काही दिसली नाही, पण काही घरांची एक चिंचोळी वाट दिसली. आत दाटीदाटीने घरे होती. एका घराच्या ओसरीतून गोठ्यात व तिथून अक्षरश: अडगळीच्या सामानातून वाट काढून पुढे जातो तर तिथे पुन्हा घरांची दाटी. त्या दाटीत डाव्या बाजूला मंदिर. अगदी थक्क करणारं दृष्य.
| beleaguered state... |
या मंदिराचे खांब उत्तम स्थितीत आहे. सुबक सफाईदारपणे कोरलेले सहा मजबूत खांब, गंभारा नी गर्भगृहावरचे छत कोसळलेले. अंतराल पूर्णपणे उधवस्त त्यामुळे मुख्य प्रवेशद्वार आता अस्तित्वात नाही. गर्भगृहाचे द्वार उत्तम दशेत. कळसाचा भला मोठा भाग दाराच्या समोरच पडलेला. देवळात एकही देवाची मूर्ती नाही. या मंदिराचा वापर कचरा कुंडी म्हणून केला जाताना दिसला. मंदिर इतकं सुंदर आहे की, त्या कचरा कुंडीची तमा न बाळगता आम्ही आत शिरून त्याचे अवलोकन केले. तोच तिथले उपसरपंच अशोक कुंभार दाखल झाले. त्यांना विचारले की, ही मंदिर कसले, तर ती कुठल्या देवाची हे काही कळत नाही. बुद्द मुर्ती असावी, गणपती, हनूमान, शिवपिंड होती असं समजतं. वाडवडिलांकडूनही या मंदिरांच्या ईष्ट देवतांबद्दलची कोणती माहिती मिळाली नव्हती असे त्यांनी सांगितले. या मंदिरांची त्वरीत स्वच्छता करायला हवी. हवं तर आम्ही काही दुर्गसेवक पाठवू असं जूजबी बोलून आम्ही मंदिर चहूबाजूंनी न्याहाळले तोच घरांच्या दाटीत आणखी एक मंदिर असल्याची माहिती मिळाले. या मंदिराचा मुख्य प्रवेशमार्ग अडगळीचे सामान टाकून बंद करण्यात आलेला आढळून आला. केवळ एक अडीच तीन फुटांची जागा आत कचरा फेकण्यासाठी ठेवल्याचे आढळून आले. आता नेहमीच कचरा फेकला जात असावा असे एकूण प्रकार पाहून स्पष्ट झाले. या दुसर्या मंदिराची तीच गत. धत कोसळलेले, याला आठ मजबूत असे उत्तम स्थितीतल कोरीव स्तंभ. गाभार्यात अर्थातच मुर्ती नव्हती. आपण थांबू शकत नाही इतका तो कचर्याचा ढिग होता. एका ठिकाणी एक सुंदरसा कोरीव दगड दिसला. त्यावर हत्ती आणि व्यालाच्या अगदी बारीक पण अतिशय देखण्या आकृती कोरलेल्य आढळल्या. सूर्य मावळण्याच्या आत तिसरे मंदिर बघणे गरजेचे होते. मुख्य रस्त्यावर आलो तर तो गाव कमालीचा स्वच्छ दिसले. खरं तर अवघा ठाणापाडा हे स्वच्छ गाव आहे. रस्त्यावर कुठेच कचरा टाकलेला आढळून आला नाही. मग या मंदिराचा वापर लोक कचरा टाकण्यासाठी का करत असावे? या विचाराने मन सुन्न झाले.
| fallen relics... |
अशोक भाऊंना घेऊन गावच्या बाहेर उत्तर बाजुला विहीच्या जवळ तिसरे मंदिर दिसले. या मंदिराचे ना स्तंभ ना छत केवळ त्यांचे भग्नावशेष आणि देवी देवतांच्या मुर्त्या माळावर विखुरलेल्या. मंदिराचे जोते अजून शाबूत आहे. एक मोठे शिवलिंग, त्याच्या मध्ये लिंगा ऐवजी कुठला तरी कोरीव स्तंभ रोवलेला तर आत चाफ्याचे झाड उगवलेले. समोरच्या बाजूला अलिकडे बांधलेली एक घुमटी दिसली. त्यात देवीच्या रूपात शेंदूर लावलेली एक मुर्ती ठेवण्यात आलेली तर बाहेरच्या बाजूला गणपतीच्या तीन मुर्त्या, शिवलिंगाशी मेळ खाणारा मोठा फुटलेल्या दशेतला नंदी आणि एक देखणी आयाळ असलेला सिंह दिसला. एक विरगळी सारखा दिसणारा तुकडाही दिसला. सुदैवाने हे मंदिर कचर्यापासून मुक्त होते. शिवपिंडीच्या आकारावरून हे मंदिर मोठे असावे याचा अंदाज बांधता येतो.
| used as gargabe bin ...😠 |
अगोदर पाहिली ती कचर्याने भरलेल्या दोन मंदिरांची स्थिती उत्तम आहे. त्यावरची झाडे वेली तातडीने काढून आतला कचरा साफ करण्याची आवश्यकता आहे. या तिनही मंदिरांचा ताबा विनाविलंब पूरातत्व विभागाने घेण्याची अवश्यकता आहे. ग्रामपंचायतीच्या मदतीने अगोदर कचरा कुंडी बंद करून तिथल्या लोकांना कचरा टाकण्याची व्यवस्था करून द्यावी. या मंदिरा भोवतीची घरे अन्यत्र उठवून मंदिरांचा परिसर मोकळा करण्याची आवश्यकता आहे. इथल्या रहिवाशांना नव्या ठिकाणी घरांना जागा दिली तर युद्ध पातळीवर या मंदिरांचा परिसर मोकळा करता येईल. त्यानंतर मंदिराचे दगड गोळा करून एक ठिकाणी आणावेत आणि मग त्यांच्या जिर्णोद्दाराचा कार्यक्रम हाती घ्यावा.
| neatly carved lion near the broken Nandi... |
छत्रपती शिवाजी महाराजांनी परकीय जोखडातून स्वराज्याचा रथ हाकताना या परिसराचे महत्व ओळखले होते. गूजरातच्या सीमावर्ती भागात असलेला किल्ला त्यांनी जिंकून घेतला होता. पूर्व काळात दळणवळणा बरोबरच या भागातून व्यापार उद्यम होत असणार यात शंका नाही. खैराई सारखा टूमदार वनदुर्ग पाहून त्याची प्रचिती येते. हा परिसर बराच काळ जव्हार किंवा रामनगर राज्याचा भाग असावा. मोगलाईचा वरवंटा येथे फिरलेला असणार हे मंदिराची भग्न दशा पाहून स्पष्ट होते. परिसरातील नागरिकांनी यास दुजोरा दिला. मंदिराचाच्या खांबाचा एक भाग आता मारूती मंदिरात हलविण्यात आलेला आहे. त्यावर एक अक्षराचा शिलालेख आहे. देसी..गड अशी ती अक्षरे. गडच्या अगोदरचे अक्षर म वाटते त्यावरून देसीरामगड सदृष्य अक्षर तयार होते. कोणा गुजरात वंशीय राजाच्या काळात तर खैराईचे हे नाव नसावे ना? त्याच्या काळात यातले एक मंदिर बाधलेले असू शकते हे त्यावरील जैन पद्धतच्या शिल्पांवरून स्पष्ट होते.
| jain deity laying by the roadside... |
या मंदिरांची स्वच्छता करून त्यांचा परिसर मोकळा केला तर हे वैभव पाहण्यासाठी इतिहासप्रेमींच्या भेटी या परिसरात सुरू होतील. खैराई दुर्ग पाहण्यासाठी येणारी मंडळी या मंदिरांना भेट देण्याची संधी दडणार नाही. गावात इतिहास आणि डोंगरभटक्यांच्या रूपाने पै पाहूणे येऊ लागतील तसे इथल्या चलनवलनालाही हातभार लागेल, तेव्हा स्थानिकांनी आपल्या गावचा हा अतिशय अनमोल असा ठेवा आता जोपासायला हवा.
| way to the tample from here |
दगड खाणींना उपयूक्त
या एकुण परिसराची एक अडचण म्हणजे केवळ पावसाच्या भरवशावर होणारी शेती. पावसाळ्यानंतर हाच शेतकरी मोलमजूरीसाठी बाहेर पडतो. त्यातल्या काही जणांना हालाखीच्या दशेत शेतीवाडी विकावी लागली आहे. संपुर्ण परिसर प्रचंड पावसाचा असून चहूबांजूनी डोंगरांनी वेढलेला आहे. गावात खडकाळ जमिनीचे फार मोठे प्रमाण आहे. डोंगर फोडूनच बांधकामासाठी दगड वापरण्याचा अभिशाप लाभलेल्या नासिक जिल्याला या निमीत्ताने जमिनीतून दगड काढण्याची एक सुवर्ण संधी आहे. त्यामुळे ज्या शेतकर्यांच्या जागेत खडक आहे, त्यांना तिथे जमिनीत दगडाची खाण चालविता येईल. याच खाणीत त्यांनी पाणी साठवणीची व्यवस्था केली तर खाण संपल्यानंतर धरणातला गाळ आणून आपल्याच जमिनीत शेतीही करता येईल व आपल्याच जमिनीत वर्षभर पूरेल इतके पाणीही साठवता येईल. त्याकरिता जमिनीतला दगड विकून आवश्यक पैसा उभा राहणार हे सांगणे न लागे. शासनालाही महसूला परी महसूल मिळेल, शिवाय डोंगर फोडून केल्या जाणार्या खाणांवर हा नामी उपाय असेल. सद्या नासिकमध्ये डोंगर वाचवा चळवळ वेगात सूरू आहे. त्यामुळे डोंगर आणि त्यावरचे जंगल आणि डोंगरामुळेच उदगम पावणार्या नद्या नी नद्यांच्या पाण्याचे स्त्रोत वाचविता येतील. याचा उपयोग तमाम जीवसृष्टीला होईल, त्यात माणसाचा अग्रक्रम राहील. नुकसान तर कोणाचेच होणार नाही हे नक्की. ठाणापाड्याच्या तीन जीर्ण मंदिरांकडून आपल्याला ही सुबूद्दी मिळेल तो सूदिन.
या निमीत्ताने चार्ली चॅप्लीनच्या चित्रपटातला एक प्रसंग या निमीत्ताने आठवला. तो हिटलरच्या सैन्यातला सैनिक असतो. त्या चौकीवर तो एकमात्र रक्षक सैनिक म्हणून काम पाहत असतो. त्याला तसे आदेश त्याच्या कप्तानाने दिलेले असतात. त्याचं काम एकच बंद डब्बा फोडून जेवण करायचं. जाड केसाळ कपडे घेलायचे आणि आकाशात बंदूकीच्या फैरी झाडायच्या. एक विमान आकाशातून येतं. तो जेवत असतो. डब्बाबंद अन्नाचा एक डबा नुकताच फोडलेला असतो. तो फोडून तो डब्बा तो बाहेर भिरकावतो. डब्ब्यांचा डोंगर झालेला असतो. तो डब्बा डब्ब्यांच्या शिखरावरून खाली घरंगळत येतानाचे दृष्य दाखवले आहे. आणि मग तो विभानाच्या दिशेने गोळ्या झाडतो. विमान गोळ्या चुकवतो. वैमानिकाच्या लक्षात येतं, युद्ध संपलेलं आहे. इथे शत्रुची कोणतीच तुकडी उरलेली नाही. तो उतरून त्या चौकीजवळ येतो आणि विचारतो, कोणावर गोळ्या झाडत आहेस. हिटरल सारखीच आपरी मिशी असलेला चार्ली म्हणतो, शत्रूवर. अरे राजा युद्ध संपलं आहे. जर्मनी हारली आहे. आता आपलीच सत्ता आहे इथे. हा अवघा प्रसंग विनोदी अंगाने दाखवला आहे. ठाणापाडच्याच्या मंदिरांचीही काहीशी तशीच गत आहे. काळाने मंदिरा भोवतीची मगरमिठी केव्हाच सैल केली आहे. परंतू मंदिराच्या नशिबास कळेना, या मंदिराचं अजूनही उत्पीडन करायचे की त्याला आता मुक्त करायचे.
चला आपल्या पैकी कोणी तरी जाऊन हलवू या...दु:स्वप्नातून जागं करू या...मंदिराची कचराकुंडी बंद करू या. त्यातले जाळे कोळिष्टके काढू या...त्यावरच्या उगलेल्या वेली, वनस्पती काढू या...जमलं तर चहुबाजूंनी आवळलेला श्वास थोडा मोकळा करू या...ठाणापाड्याचं खरे वैभव जितका खैराईचा किल्ला आणि त्या भोवतालचं जंगल आहे तितकीच ही तीन मंदिरे.
।।जय हो।।
| outter portion demolished and blocked with scrap material |
| opening kept to throw garbage |
| residence around the temple |
| the masjid road of thanapada kept neat and clean |
| the third of the temple site of Thanapada |
| big shivlinga |
| destroyed Goddess... |
| sculptors laying in the open... |
| shree Ganesh |
| diety at the recently built ghumti |
| oneword stone inscription denoting letters Desi x x gad... |
| sordid state: both temples used for garbage... |
| fine carved Elephants and Vyalla and Goddess... |
| unbearable garbage... |
| very nicely carved pillars still intact. |
| the entrance of the first temple |
| scrap storage |
| hidden by the creepers and shrubs |
| stone inscription pillar kept at the Hanuman temple http://prashantpardeshi.blogspot.com/2022/01/blog-post.html |
नहपानाचा कोरीव लेख (Nashik Inscription of Nahapan)
क्षहरात वंशाचा राजा नहपान याचा प्रसिद्ध प्राचीन कोरीव लेख. महाराष्ट्रातील नाशिक शहरापासून सु. ९ किमी. अंतरावर नैर्ऋत्य दिशेला त्रिरश्मी टेकडीवरील असलेल्या पांडव लेणी समूहात हा अभिलेख आहे. येथील लेणी क्र. १० मध्ये व्हरांड्याच्या मागील भिंतीवर छताच्या खाली पाच ओळींत कोरलेला हा अभिलेख दिसून येतो. दानपत्रात किंवा प्रस्तरलेखात राज्यकर्त्याच्या नावाने लेख लिहिण्याची तत्कालीन पद्धत असल्यामुळे राजा नहपानाचे नाव लेखात आले आहे. त्यामुळे हा लेख नहपानाचा जावई ऋषभदत्ताने (उषवदात) कोरविला असला, तरी नहपानाच्या नावाने ओळखला जातो. लेख ब्राह्मी लिपित असून अक्षरांचे वळण घवघवीत व ठाशीव स्वरूपाचे आहे. लेखाची अक्षरे जाड असून पूर्वी गोलाकार असलेली अक्षरे कोनयुक्त व कोनयुक्त अक्षरे गोलाकार बनली आहेत. एकूण लिपीचे स्वरूप डौलदार आहे.

लेणी क्र. ३८ च्या लेखावरून हा लेख शक संवत् ४२ (इ. स. १२०-२१) मध्ये कोरला गेला असावा, असे वा. वि. मिराशी यांचे मत आहे. त्यांनी अक्षरांच्या आकारावरून व भाषेवरून असे अनुमान काढले आहेत की, हा सर्व लेख एकदम कोरला गेलेला नव्हता. पहिल्या दोन ओळी व तिसऱ्या ओळीचा पहिला तीन-चतुर्थांश भाग मोठ्या अक्षरांत असून तो हे लेणे खोदून झाल्यावर लागलीच कोरलेला असावा. नंतर पहिल्या परिशिष्टाचा लेख थोड्या लहान अक्षरांत कोरला आहे. नंतर त्यापेक्षाही लहान अक्षरांत कोरलेल्या दुसऱ्या परिशिष्टात ऋषभदत्ताने त्या लेण्यात राहणाऱ्या बौद्ध भिक्षूंच्या भोजनाकरिता दिलेल्या एका शेताच्या दानाचा उल्लेख आहे. ही परिशिष्टे पहिल्या लेखानंतर दोन-तीन वर्षांत कोरविली असावी, असे त्यांनी नमूद केलेले आहे.
लेखाच्या भाषेवर प्राकृताची छाप आहे. ऋषभदत्त या नावातील ‘ऋ’ च्या जागी ‘उ’ झाला व ‘ष’ च्या जागी ‘स’ झाला. लेखाच्या पहिल्या भागाची भाषा काही अंशी अशुद्ध असलेली संस्कृत असून वाक्यरचना तृतीय पुरुषी आहे. नंतरचे पहिले परिशिष्ट प्राकृतात असून त्यातील वाक्यरचना प्रथम पुरुषी आहे. दुसरे परिशिष्टही प्राकृतात आहे, पण त्यातील वाक्यरचना पुनः तृतीय पुरुषी आहे.
या लेखात निरनिराळ्या तीर्थस्थानी ब्राह्मण व भिक्षूंना दिलेली भोजने व दाने तसेच लोककल्याणकारी कामांचा उल्लेख आहे. नहपानाने दुसऱ्या शतकाच्या प्रथमार्धात महाराष्ट्रावर राज्य केले. आपले वर्चस्व प्रस्थापित करण्यासाठी लोकोपयोगी सार्वजनिक कामेही केली. काही कामे त्याने केली, तर काही कामे त्याने आपल्या जावयाकडून करविली.

पहिल्या लेखाचा उद्देश नहपानाचा जावई व दीनीकाचा पुत्र ऋषभदत्त याने गोवर्धन नगराच्या त्रिरश्मी पर्वतात प्रस्तुत लेणे व त्यासाठी पाण्याची टाकी खोदविली, हे नमूद करण्याचा आहे. ऋषभदत्ताने केलेल्या धर्मकृत्यांचा उल्लेख केला असून त्यास ‘धर्मात्मा’ संबोधले आहे. त्याने तीन लाख गायी दान दिल्या; बार्णासा नदीच्या काठी सुवर्णदान केले व घाट बांधला; देव व ब्राह्मणांना सोळा गावे दान दिली; व प्रतिवर्ष लक्ष ब्राह्मणांना भोजन घालत आलेला आहे; प्रभास या पवित्र तीर्थी ब्राह्मणांचे आठ भार्यांशी विवाह लावून दिलेले आहेत; भरुकच्छ, दशपुर, गोवर्धन व शूर्पारक येथे चौसोपी घरे निवासाकरिता दान दिली; उद्याने, तलाव व विहिरी निर्माण केल्या; इबा, पारदा, दमण, तापी, करबेणा आणि दाहनुका या नद्या पार करण्याकरिता धर्मार्थ तरींची सोय केली; या नद्यांच्या दोन्ही काठांवर धर्मशाळा बांधल्या व पाणपोया घातल्या आणि पिंडीतकावड, गोवर्धन, सुवर्णमुख, शोर्पारग आणि रामतीर्थ येथे संन्याशांना (भिक्षुसंघांना) नानंगोल गावातील बत्तीस हजार नारळीची झाडे दान दिली.
पहिल्या परिशिष्ट लेखात ऋषभदत्त सांगतो की, भट्टारकाच्या (नहपान) आज्ञेवरून मी वर्षाऋतूमध्ये मालयांनी वेढा घातलेल्या उत्तमभद्रांना सोडविण्याकरिता चालून गेलो. माझ्या स्वारीच्या निर्घोषाने ते मालय पळू लागले; तेव्हा त्यांना पकडून मी त्यांना उत्तमभद्र क्षत्रियांच्या ताब्यात दिले. नंतर मी पुष्कर क्षेत्री जाऊन स्नान केले आणि तीन सहस्र गायींचे आणि एका गावाचे दान दिले.
दुसऱ्या परिशिष्टात ऋषभदत्ताने वाराहीपुत्र अश्विभूती या ब्राह्मणाकडून त्याच्या पित्याच्या मालकीचे गोवर्धन नगराच्या ईशान्य दिशेस असलेले एक शेत चार हजार कार्षापण नाणी देऊन विकत घेतले आणि ते आपल्या लेण्यात राहणाऱ्या चारी दिशांच्या भिक्षूंच्या मुख्य आहाराकरिता दान दिले, असे सांगितले आहे.
प्रस्तुत लेखात अनेक नद्यांचे व स्थळांचे उल्लेख आलेले आहेत. भगवानलाल इंद्रजी यांनी बहुतेक नावांचे आधुनिक पर्याय सुचविले आहेत. बार्णासा नदी ही सध्याची बनास, इबा ही अंबिका, पारदा ही पार, दमण ही दमणगंगा, करबेणा ही कावेरी असावी, असे भगवानलाल यांनी सुचविले आहे. मिराशींच्या मते दाहानुका ही मुंबईच्या उत्तरेकडील डहाणू जवळची खाडी असावी.
स्थळांच्या उल्लेखांपैकी प्रभास (काठेवाडातील सध्याचे प्रभास), भरुकच्छ (भडोच), दशपुर (माळव्यातील मंदसोर), शोपरिग (सोपारा), पोक्षर (पुष्कर) यांचा उल्लेखही या लेखात येतो. तसेच लेखात नहपान आणि दीनीक ही शक नावे आली असून उषवदात हे नाव मात्र भारतीय आहे. लेखात कार्षापणाचा उल्लेख असून ४००० हा अंक आकड्यात लिहिला आहे.
संदर्भ :
- West E. W. & West, A. A., Nashik Cave Inscriptions, Bombay, 1862.
- Senart, E., Epigraphia Indica (Vol. VIII), New Delhi, 1981.
- Gazetteer of the Bombay Presidency (Nashik), Vol. XVI, Government Central Press, Bombay, 1883.
- गोखले, शोभना, पुराभिलेखविद्या, पुणे, २००७.
- मिराशी, वासुदेव वि. सातवाहन आणि पश्चिमी क्षत्रप यांचा इतिहास आणि कोरीव लेख, मुंबई, १९७९.
लासलगावची ऐतिहासिक गोष्ट....
चांदवड येथील रंगमहाल आणि निफाडचा होळकरवाडा या दोन्हींच्या मध्यवर्ती ठिकाणी संरक्षणाच्या दृष्टीने लष्करी तळ असावा म्हणून येथे भुईकोट किल्ला बांधला. त्यानंतर येथे लष्कराची छावणी देखील उभारली गेली. यामुळे आजचे लासलगाव हे त्याकाळी लष्कराचे गाव या नावाने प्रसिद्ध झाले. मल्हारराव होळकरांच्या निधनानंतर संपूर्ण राज्याचा कारभार अहिल्यादेवी होळकर बघू लागल्या होत्या.
अहिल्याबाई होळकर यांनी सत्ता हाती घेतल्यानंतर त्यांच्या राज्यात गुंडांनी हैदोस घालत लूटमार सुरू केली होती. त्यामुळे या गुंडांचा बंदोबस्त करण्याकरिता अहिल्याबाई होळकर यांनी जो कोणी या गुंडांचा बंदोबस्त करेल त्याच्याशी माझ्या मुलीचे लग्न लावून दिले जाईल, असे फर्मान सोडले. त्यानुसार होळकर यांच्या राज्यातीलच यशवंतराव फणसे यांनी गुंडांचा बंदोबस्त केला. दिलेल्या शब्दाप्रमाणे अहिल्याबाई होळकर यांनी आपली कन्या "मुक्ताबाई' हिचा विवाह यशवंतराव फणसे यांच्याशी लावून देत त्यांना आंदण म्हणून लष्कर गावचा भुईकोट किल्ला निफाडचा होळकरवाडा असा राज्यातील अनेक भाग जहागिरीच्या स्वरूपात दिला गेला.
भुईकोट किल्ला आजही भक्कम स्थितीत
मल्हारराव होळकर यांनी बांधलेला लासलगाव येथील भुईकोट किल्ला आजही भक्कम स्थितीत आहे. किल्ल्यास दोन मुख्य दरवाजे असून, पहिला दरवाजा हा आजची लासलगावची वेश म्हणून डौलाने उभी आहे. दुसरा मुख्य दरवाजा किल्ल्याच्या प्रवेशद्वाराजवळ असून, त्याचे लाकडी दरवाजे व त्याला लावलेले "गजखिळे' आजही तसेच आहेत. किल्ल्याच्या मुख्य दाराने प्रवेश केल्यानंतर किल्ल्याच्या मधील भागात "राणी महाल' आहे. या राणी महालाचे वैशिष्ट्य म्हणजे लाकडावर हिरे-मोती वापरून सुबक नक्षीकाम केलेले आहे. किल्ल्याच्या आत वीटकामाची व दगडीकामांची सुंदर सज्जे असलेली भक्कम तटबंदी आहे, ध्वजारोहणाकरिता जागा असून, आजही ही जागा शाबूत आहे. आशिया खंडातील सर्वांत मोठी कांदा बाजारपेठ असलेल्या लासलगावात आज हा भुईकोट किल्ला डौलाने उभा असून, ध्वज खांबावर भगवा फडकताना दिसतो.
------
आब्बड कुटुंबाकडे मालकी
1766 मध्ये मुक्ताबाई यांचा विवाह झाल्यानंतर त्यांचे वास्तव्य या लष्करी छावणीत होते. 1791 मध्ये सरदार यशवंतराव फणसे यांचे आकस्मात निधन झाल्यानंतर मुक्ताबाई सती गेल्या. त्यानंतर यशवंतरावांचे पाचवे वंशज गणपतराव फणसे यांच्याकडे किल्ल्याचा कारभार गेला. 19 व्या शतकाच्या सुरवातीला हा भुईकोट किल्ला राजस्थान येथून आलेले व्यापारी शिवराज आब्बड यांनी एक हजार 300 रुपये भरणा करत किल्ल्याचे मालकीहक्क विकत घेतले. त्यानंतर 1969 मध्ये या किल्ल्याची मालकी आब्बड कुटुंबाला दिली गेली. आजही पंचक्रोशीमध्ये या कुटुंबाला "किल्लेवाले' या नावाने ओळखले जाते.
नाशिक जिल्ह्यातील लासलगाव येथील पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या कारकीर्दीतील अत्यंत सुंदर असा भुईकोट किल्ला आजही चांगल्या स्थितीमध्ये बघावयास मिळतो. कालांतराने या किल्ल्याची खासगी मालकी झाली. यशवंतराव फणसे यांच्याकडे बराच काळ भुईकोट किल्ला होता. अनेक चांगल्या-वाईट घटनांचा तो मूक साक्षीदार आहे.
संजय बिरार (इतिहास अभ्यासक, लासलगाव)
-------
लासलगावची शान असलेल्या आमच्या या भुईकोट किल्ल्यात आज आमची पाचवी पिढी आनंदाने राहत आहे. आजही सायंकाळी सातला मुख्य दरवाजा बंद केला जातो, तर सकाळी साडेसहाला उघडला जातो. त्या काळातील किल्ल्यातील पीरबाबांचे स्थान आजही असून, गुरुवारी त्याची विधिवत पूजा केली जाते.
सोनू आब्बड (किल्ल्यात वास्तव्य करणारी पाचवी पिढी, लासलगाव)
लासलगाव
प्रकार : गढी
जिल्हा : नाशिक
उंची : 0
श्रेणी : सोपी
अहिल्यादेवी होळकरांच्या दूरदृष्टीमुळे आज कांद्याचं 'लासलगाव' ताठ मानेने उभं आहे.
अहिल्यादेवी होळकरांच्या दूरदृष्टीमुळे आज कांद्याचं ‘लासलगाव’ ताठ मानेने उभं आहे.

नाशिक जिल्ह्यातील लासलगाव आज आपल्या कांद्याच्या बाजारपेठेमुळे जगाच्या नकाशावर जाऊन पोहचलेल आहे. आशियातील सर्वात मोठे कांद्यांचे मार्केट म्हणून या गावाला ओळखले जाते. शेतकऱ्यांच्या घामाला न्याय मिळवून देणारे असे हे लासलगाव.
या गावाला होळकरी इतिहासाची महान परंपरा आहे.
सुभेदार मल्हारराव होळकर हे मुळचे जेजुरीजवळच्या होळ गावचे. पहिल्या बाजीरावाच्या काळात आपल्या पराक्रमाने त्यांनी सुभेदारी मिळवली. उत्तरेत मराठेशाहीचा जरीपटका लहरला या मागे होळकर शिंदे गायकवाड या घराण्याने गाजवलेली तलवार कारणीभूत ठरली.
साधारण १७५० साली मल्हारबाबांना चांदवड परगण्याची जहागिरी मिळाली. या जहागिरीच्या रक्षणासाठी त्यांनी एका भुईकोट किल्याची उभारणी केली. कालांतराने या भागात लष्करी तळ उभा राहिला.
हे होळकरी लष्कराच गाव अपभ्रंश होऊन बनलं लासलगाव.
मल्हारबाबांनी आपल्या मुलाच्या मृत्यूनंतर आपल्या सुनेला सती जाण्यापासून परावृत्त केले आणि राज्याची सर्व धुरा त्यांच्यावर टाकली. त्यांना राज्यकारभारात तयार केलं.
पुढे मल्हारबाबांचा वारसा पुण्यश्लोक अहिल्यादेवींनी समर्थपणे सांभाळला.
होळकरांची राजधानी माळव्यात महेश्वर येथे होती. इतक्या दुरहून निफाड चांदवडमधल्या आपल्या जहागिरीकडे लक्ष देणे त्यांना अवघड जात होते. लासलगावचा भाग पूर्वीपासून सुपीक होता. येथे बाहेरून येणाऱ्या लुटारुंचे व गुंडगिरीचे प्रमाण वाढले होते. अनेक प्रयत्न केले तरी त्याला अटकाव करता येणे अशक्य झाले होते.
अशी कथा सांगितली जाते की अहिल्यादेवींना ही रयतेची रोज चालेली लुट बघवत नव्हती. अखेर त्यांनी या लुटारूंचा व गुंडांचा कोण बिमोड करेल त्याला मोठ इनाम देण्यात येईल अस जाहीर केलं. यात यशवंतराव फणसे हा धनगर युवक पुढे आला.
त्याने आपल्या पराक्रमामुळे लासलगावमधून सर्व लुटारू पळवून लावले. गावाचा बंदोबस्त केला.
त्यांच्या या पराक्रमामुळे अहिल्यादेवींनी त्यांना मोठे इनाम तर दिलेच पण शिवाय आपल्या लाडक्या मुलीचा म्हणजेच मुक्ताबाईचा त्यांच्याशी विवाह लावून दिला. त्यांना आंदण म्हणून महाराष्ट्रातील लासलगाव व किल्ला, निफाडचा होळकर वाडा सोनेवाडी, चांदवड मधील शिवरे बोऱ्हाके, जुन्नर मधील मडके जांब व जमीन आणि मध्यप्रदेशातील तराणा प्रांताची जहागीरदारीच्या स्वरूपात दिली होती.
सरदार यशवंतराव फणसे व त्यांच्या घराण्याने अनेक वर्ष लासलगावचे रक्षण केले. त्यांना शिक्षा देणे, कर वसुली, यात्रेचा मान, पाटीलकी असे अनेक अधिकार लासलगाव व निफाड प्रांतात होळ्करांतर्फे प्रदान करण्यात आले.
नंतर १८१८ मध्ये मराठा सत्तेचा अस्त झाल्यावर इंग्रज काळात सुध्दा पाटीलकिचे वतन वंश परांपरागत सरदार फणसें कडे तसेच ठेवले.
संपूर्ण लासलगावच्या भोवती दगडी तटबंदी व सात वेशी होत्या व त्याच्या आत सध्याचा बालेकिल्ला होता. तटबंदीचे काही अवशेष आजही आपल्याला पाहवयास मिळतात व सात वेशी पैकी आज फक्त एकच वेश नजरेस पडते.
लासलगावचा भुईकोट किल्ल्याचे दोन मजबूत प्रवेशद्वार, त्यावर लोखंडी खिळे, सदर, प्रचंड मोठे पाषाणी बुरुज, त्याकाळचे भुयारी मार्ग, बाहेरून आलेल्या शत्रूवर मारा करण्यासाठीच्या बुरूज व तटबंदीमध्ये सज्जे, चौरस आकार, भक्कम तटबंदी तसेच उत्तर बाजूस मुख्य दरवाजा आणि त्याचे दोन बुरुज असे एकूण आठ बुरुज आहेत.
प्रत्येक बुरुजावर खिडक्या व छरी आहेत. तोफ किवा बंदुका यांचा शत्रूवर मारा करायला यावा या उद्देशाने या खिडक्या व छरी बुरुजावर आहेत.
शत्रूने हत्तीच्या साहाय्याने दार तोडण्याचा प्रयत्न करू नये म्हणून खबरदारीचा उपाय म्हणजे “गजखिळे” आजही पाहायला मिळतात. याच उत्तरेला तोंड करून असलेल्या दारातून होळकरी सैन्य आपल्या शत्रूंवर चालून जात असेल.
किल्ल्याच्या बाहेर गणेश मंदिर व एका बारवेचा निर्माण अहिल्यादेवी यांनी केलेला आहे. किल्ल्यात राणीचा महाल होता. त्याच्या खांबावर हिरे मोतींचे नक्षीकाम केले होते असे म्हणतात.
पुढे कालांतराने काही तरी संकट आले व फणसे घराण्यातील पुढच्या पिढीने लासलगावचा किल्ला अब्बड या व्यापार्याला पाच हजार रूपयात विकला.
आजही हा किल्ला आब्बड कुटुंबाकडे आहे. लासलगावची शान असणाऱ्या या किल्ल्यावर भगवा जरीपटका लहरतान दिसून येईल.
अहिल्यादेवींच्या कारकिर्दीत लासलगावची उभारणी केली. या गावाला संरक्षण दिले. स्थैर्य दिले. गुंडापुंडाचा नायनाट केला. यामुळेच पुढे कालांतराने हे गाव बाजारपेठ म्हणून उदयास आले. आसपासच्या भागातील शेतकऱ्यांनी पिकवलेला उच्च दर्जाचा कांदा विकण्यासाठी हक्काची जागा मिळाली. आजही ही ओळख टिकून आहे याचं श्रेय जाते महाराणी अहिल्यादेवी होळकर यांच्या दूरदृष्टीला.
किल्ले लासलगाव (Lasalgaon Fort)
ता.निफाड जि.नाशिक(महाराष्ट्र)
इतिहास :
सुभेदार मल्हारराव होळकर(पहिले) यांना सन १७५० च्या दरम्यान चांदवड परगण्याची जहागिरी मिळाली त्यांनंतरच्या काळात या किल्ल्याच्या पायाभरणीला सुरवात झाली असावी पण या किल्ल्याच्या निर्माण हा होळकरकालीनच.
“लासलगाव” या नावाच्या मागे एक लोककथा आहे ती अशी कि, राणी अहिल्यादेवी होळकर यांच्या काळापासूनचा लासलगावचा प्रदेश सुपीक होता व या सुपीक प्रदेशावर परकीयांचे आक्रमण होण्याचा जास्त शक्यता होती त्यामुळे राणी अहिल्यादेवी यांनी या ठिकाणी लष्करी भुईकोट निर्माण करण्याचे ठरवले व निर्माण केलाही. कालांतराने हे गाव लष्करी नियंत्रणाखालील गाव म्हणून घोषित केले त्यामुळे या गावाला लष्करी गाव म्हटले जाऊ लागले. पुढे लष्करी गावाचा ब्रिटिश काळात अप्रभ होऊन लासलगाव म्हटले जाऊ लागले.
सन १७६६ ला राणी अहिल्यादेवी होळकर यांची कन्या मुक्ताबाईचा विवाह सरदार यशवंतराव फणसे यांच्याशी झाला. त्यानंतर सरदार यशवंत फणसे यांना राणी अहिल्यादेवींनी आंदण म्हणून महाराष्ट्रातील लासलगाव व किल्ला, निफाडचा होळकर वाडा सोनेवाडी, चांदवड मधील शिवरे बोऱ्हाके, जुन्नर मधील मडके जांब व जमीन आणि मध्यप्रदेशातील तराणा प्रांताची जहागीरदारीच्या स्वरूपात दिली होती. तराणा प्रांत हा अहिल्यादेवींच्या खाजगी जहागिरीचा होता.
शिवाय सरदार फणसे घरण्याला शिक्षा देणे, कर वसुली, यात्रेचा मान, पाटीलकी असे अनेक अधिकार लासलगाव व निफाड प्रांतात होळ्करांतर्फे प्रदान करण्यात आले. नंतर १८१८ मध्ये मराठा सत्तेचा अस्त झाल्यावर इंग्रज काळात सुध्दा पाटीलकिचे वतन वंश परांपरागत सरदार फणसें कडे तसेच ठेवले.
सन १७९१ ला यशवंतराव फणसे यांच्या अकस्मिक निधनानंतर मुक्ताबाई किल्ले महेश्वर येथे सती गेल्या. यशवंतरावांचे पाचवे वंशज गणपतराव रेवजी फणसे यांच्याकडे लासलगावच्या किल्ल्याचा कारभार होता. सन १८३५ रोजी इंदूर येथील होळकरांचे तत्कालीन महाराज हरीराव महाराजांच्या विरोधात त्यांनीच नेमलेल्या फणशेच्या सरदाराने बंड केले.
होळकर महालात फणशांचे गारदी घुसले. परंतू त्यांचे नियोजन फसले आणि हरिरावांच्या सैनिकांनी गारद्यांची कत्तल केली. या बंडाचे नेतृत्व करणार्या राजाभाऊ फणसे यांना हरीराव महाराजांचा वारसदार तुकोजीराव(दुसरे) यांनी ठार केले. या घटनेमुळे लासलगावच्या किल्ल्याचा कारभार सांभाळणारे त्यांचे बंधू गणपतराव सैरभैर झाले.
आपली काही धडगत नाही, शिवाय इंग्रज सरकार या घटनेचा फायदा घेऊन आपल्यावर कारवाई करून आपल्यावर जप्ती आणतील या आशंकेतून गणपतरावांनी लासलगावचा किल्ला अब्बड या व्यापार्याला पाच हजार रूपयात विकला. त्यामुळे आज हा किल्ला खाजगी मालकीची संपत्ती आहे.

सन १८४८ ला ब्रिटिशांनी नगर जिल्हा होळकरांकडून ताब्यात घेतल्यामुळे फणसे घराणे नामधारी राहिले. लासलगाव व निफाडचा पाटिलकी चा बिल्ला नाशिकच्या कलेक्टरने १९३७ ला दिला होता. नंतर भारत स्वतंत्र झाला. सर्व संस्थाने भारतात विलीन झाली. १९५२ ला वंशपरांपरागत पाटीलकी रद्द करण्यात आली. त्यामध्ये सरदार फणसेंची ही पाटीलकी रद्द झाली.
माहिती :
पूर्वी संपूर्ण लासलगावच्या भोवती दगडी तटबंदी व सात वेशी होत्या व त्याच्या आत सध्याचा बालेकिल्ला होता. तटबंदीचे काही अवशेष आजही आपल्याला पाहवयास मिळतात व सात वेशी पैकी आज फक्त एकच वेश नजरेस पडते. त्या वेशी वर श्रीराम मंदिर ट्रस्ट असे लिहिलेले आहे. वेस आजही चांगल्या स्थितीत असून जांग्या व पाकळी कलाकृती वरील बाजूस बघायला मिळते. या वेशीवरून पूर्वीच्या संपूर्ण तटबंदीचा घेरा केवढा असेल याचा अंदाज येतो. तटबंदी मध्ये पाषाण व विटांचा वापर केलेला दिसतो.
लासलगावचा भुईकोट किल्ल्याचे दोन मजबूत प्रवेशद्वार, त्यावर लोखंडी खिळे, सदर, प्रचंड मोठे पाषाणी बुरुज, त्याकाळचे भुयारी मार्ग, बाहेरून आलेल्या शत्रूवर मारा करण्यासाठीच्या बुरूज व तटबंदीमध्ये सज्जे, चौरस आकार, भक्कम तटबंदी तसेच उत्तर बाजूस मुख्य दरवाजा आणि त्याचे दोन बुरुज असे एकूण आठ बुरुज आहेत. प्रत्येक बुरुजावर खिडक्या व छरी आहेत. तोफ किवा बंदुका यांचा शत्रूवर मारा करायला यावा या उद्देशाने या खिडक्या व छरी बुरुजावर आहेत.
मुख्य प्रवेशद्वाराचे लाकडी दरवाजे आणि गजखिळे अजूनही भक्कम आणि शाबूत आहेत, त्यावरील होळकर कालीन लाकडी व लोखंडी नक्षीकाम हि वाखन्याजोगे आहे. शत्रूने हत्तीच्या साहाय्याने दार तोडण्याचा प्रयत्न करू नये म्हणून खबरदारीचा उपाय म्हणजे “गजखिळे”. उत्तरेकडे तोंड असलेल्या याच दरवाज्यातून कित्येक स्वाऱ्यांसाठी होळकरांची घोडी-लष्कर भरदाव वेगाने बाहेर पडली असतील.
किल्ल्याच्या मधल्या भागात आज तसे काहीच नाही मात्र पूर्वी लाकडी महाल अस्तित्वात होता. त्याचे सर्व काम हे लाकडात असल्यामुळे त्याला लाकडी महाल किंवा राणी महाल म्हटले जात. या महालातील लाकडांवर हिरे मोती वापरून सुबक असे नक्षीकाम केले होते. काळाच्या औघात हिरे मोती गायब झाले व ९० च्या दशकात जेव्हा संपूर्ण महाल खांदून काढला तेव्हा त्यामधील लाकडात काही हिरे मिळाले होते असे सांगितले जाते.
हा किल्ला लष्करी दृष्टिकोन ठेऊन बांधला असल्यामुळे स्वतःच्या संरक्षणाची पण होळकरांनी खबरदारी घेतलेली दिसते. या किल्ल्यात भुयारी मार्ग नजरेस पडतात. या भुयारी मार्गाच्या अनेक शाखा आहेत त्यातील काही भुयार हे येथून २० कि.मी अंतरावर असणाऱ्या चांदवडच्या होळकर वाड्यात निघतात व काही निफाडच्या होळकर वाड्यात व काही येथून काही अंतरावर असलेल्या होळकर वस्तीवर. होळकर वस्तीवर असलेल भुयार नष्ट होण्याच्या मार्गावर आहे. जिवीतास धोका असल्याचे कारण तेथील स्थानिक लोक देतात. जीवितास धोका आहे म्हणून एखादा ऐतिहासिक वारसा नष्ट करायचा हा एकमेवच पर्याय आपल्याकडे आहे का?
वीटकामाची व दगडी कामाची सुंदर सज्जे असलेली तटबंदी मजबूत आहेत. सध्या किल्ल्यात खाजगी मालकाचे सहा ते सात कुटुंब राहत आहेत. काही तटबंदीवर आतल्या बाजूने अजूनही चुनेगच्ची पद्धतीची कलात्मक नक्षी शिल्लक आहे, नक्षीमध्ये चिन्हे दिसून येतात. ध्वजारोहनची जागा हि आजच्या घडीला व्यवस्थित आहे.
सरदार यशवंतराव फणसे व मुक्ताबाई यांचा जीवनातील बहुतेक काळ हा महेश्वरला गेला. महेश्वर दरबारी फणसे घराण्याला मानाचे स्थान होते. राणी अहिल्यादेवी होळकर यांनी इंदोर-महेश्वर ते पंढरपूर अशी आषाडी दिंडी सुरु केली होती. त्या दिंडीची सर्व जबाबदारी हि यशवंतराव फणसे यांची असायची.
यशवंतराव व मुक्ताबाई त्या दिंडीबरोबर पंढरपूर पर्यंत पायी वारी करत असत. पुन्हा ती होळकरांची दिंडी महेश्वरच्या दिशेने मार्गस्थ झाली कि ते दोघे लासलगावच्या किल्ल्याला मुक्कामी येत असत. मात्र या किल्ल्याचा मुख्य वापर हा लष्करीदृष्ट्याच केलेला दिसतो. आजही होळकरांची दिंडी इंदोर ते पंढरपूर अशी वारी करते व शेवटचा मुक्काम हा पंढरपूरच्या होळकर वाड्यात असतो.
होळकरशाहीचे पहिले महाराजा यशवंतराव होळकर व इंग्रज यांच्यात हि या किल्ल्यावरून अनेक वेळा संघर्ष झालेला कागदोपत्री बघायला मिळतो. यावरून लासलगाव परिसर व किल्ला लष्करीदृष्ट्या किती महत्त्वाचा होता हे समजू शकते.
राणी अहिल्यादेवी यांनी राज्य परराज्यात जलसाठे निर्मिले मग त्याच्या कर्तृत्वातून लासलगावचा परिसर कसा सुटला असेल. या नजरेने आसपासच्या परिसरात अनेक हेमाडपंथी मंदिरे तसेच चिरेबंदी काळ्या पाषाणातल्या बारवा पाहावयास मिळतात. किल्ल्याच्या बाहेर इच्छापूर्ती गणेश मंदिर व एका बारवेचा निर्माण अहिल्यादेवी यांनी केलेला आहे. हे गणेश मंदिर आकाराने लहान असून प्रसिद्ध आहे. बारवेचे संपूर्ण बांधकाम काळ्या पाषाणात असून दोन मजली आहे. बारवेत दोन कमानी असून दोन्ही बाजूला देवळ्या पाहवयास मिळतात. एकदंरीत बारवेचे बांधकाम उत्कृष्ट व मनाला भावणारे आहे.
राणी अहिल्यादेवींच्या इतिहासात आपल्याला एक कथा अशी ऐकण्यास मिळते कि, मल्हारराव होळकरांच्या मृत्यू नंतर काही वर्षांनी निमाड प्रदेशात दरोडेखोरांचा सामान्य जनतेला त्रास होऊ लागला होता त्यामुळे राणी अहिल्यादेवीनी किल्ले महेश्वर दरबारी एक पण ठेवला होता, जो कोणी या दरोडेखोरांचा बंदोबस्त करेल, जबर बसवेल त्याच्याशी मी माझी मुलगी मुक्तबाई हीचा विवाह लावून देईल तेव्हा त्या दरबरातील एक धाडसी भिल्ल किंवा आदिवासी तरुण पुढे आला व त्याने हा पण पूर्ण केला. त्यांनतर अहिल्यादेवीनी आपली मुलगी मुक्तबाई हीचा विवाह यशवंतरावाशी लावून दिला. पण या कथेचा कोठे हि कागदोपत्री उल्लेख मिळत नाही किंवा मला तरी अद्याप मिळाला नाही.
याच कथेचा फायदा घेऊन काही लोकांकडून अहिल्यादेवींनी आंतरजातीय विवाहाला प्रोत्साहन दिले असे सांगितले जाते. अहिल्यादेवींनी आंतरजातीय विवाहाला प्रोत्साहन दिले? का नाही? हा वेगळा विषय होऊ शकतो मात्र हि कथा आंतरजातीय विवाहाचे उदाहरण होऊ शकत नाही. कारण यशवंतराव फणसेंचे सध्याचे वंशज हे जातीने धनगर आहेत. तसेच ज्या इतिहासकारांनी यशवंतराव फणसे यांचा आदिवासी असा उल्लेख केला आहे त्यांनी त्याचे तत्कालीन दाखले दिले नाहीत त्यामुळे सध्याच्या माहितीवरून आपुन असा निष्कर्ष काढू शकतो कि, यशवंतराव फणसे हे जातीने धनगर होते व अहिल्यादेवींनी आपल्या मुलीचा विवाह हा जातीमधील तरूणाशीच लावला होता.
नानासाहेब होळकर हे सध्या फणसे घराण्याचे वंशज आहेत, असे ते सांगतात. सध्या त्यांचे वास्तव्य हे निफाडला असते. नानासाहेब होळकर हे फणसे घराण्याला दत्तक आले आहेत.
माहितीसाठी आभार :
नानासाहेब होळकर, निफाड, जि.नाशिक
फोटोसाठी आभार :
आनंद बोरा, अमर रेड्डी, प्रशांत परदेशी
अधिक फोटो पाहण्यासाठी Click करा
काही शंका किंवा सूचना असल्यास संपर्क करा.
contact@ahilyabaiholkar.in
लासलगाव | हारूण शेख | Lasalgaon
लासलगावच्या उत्तरेला आहिल्याबाई होळकरांची (Ahilyabai Holkar) उपराजधानी चांदवड तर दक्षिणेला सरदार विंचूरकरांचे संस्थान. सरदार विठ्ठल शिवदेव दाणी (विंचूरकर) मल्हारराव होळकर या दोन्ही सरदारांनी थोरल्या बाजीरावांच्या कारकिर्दित शौर्य गाजविले…
त्यामुळे बक्षिसरुपी मल्हारराव होळकरांना इंदौर, चांदवड व इतर सुभे मिळाले व सरदार विंचूरकरांना विंचूर गाव व इतर सुभा मिळाला. विंचूर-चांदवड हा मार्ग लासलगावातूनच जातो. याच मार्गाने पूर्वी सरदार विंचूरकर, मल्हारराव होळकर हे ये-जा करायचे.
लासलगाव (Lasalgaon) हा मधला पठारी भाग म्हणून या काळात व्यापारी दृष्टीने व लष्कराला हालचाली, कवायती करता याव्या म्हणून या ठिकाणी भुईकोट किल्ला (Bhuikot Fort) बांधण्यात आला. आजही कांद्याच्या आगारात हा किल्ला ताठ मानेने उभा आहे.
पुण्यश्लोक अहिल्यादेवींनी या किल्ल्याची जहागिरी आपल्या जावयाला दिली. किल्ला भुईकोट असून त्याचा रुबाब बघून आपण थक्क होतो. लासलगावची जुनी वेस ओलांडून आत तो सापडतो. या किल्ल्याची कहाणी थक्क करणारी आहे. यशवंतराव हे एक साधारण शिपाई होते परंतू अहिल्यादेवींना शूर जावईच हवा होता.
यशवंतरावांची निवड स्वयंवरातून झाली. त्यांनी जावयाला निफाडचा वाडा, लासलगावचा किल्ला, जुन्नर आदी जहागिरी बहाल केली. यशवंतरावांच्या निधनानंतर त्यांचे वंशज गणपतराव फणसे यांच्याकडे या किल्ल्याचा कारभार आला. 1835 दरम्यान इंदूरच्या गादी सांभाळणार्या हरीराव महाराजांच्या विरोधात त्यांनीच नेमलेल्या फणशांच्या सरदाराने बंड केले. होळकर महालात फणशांचे गारदी घुसले पण नियोजन फसल्याने हरिरावांच्या सैनिकांनी गारद्यांची कत्तल केली. या बंडाचे नेतृत्व करणार्या राजाभाऊ फणसे यांचे हरीराव महाराजांचे वारसदार तुकोजीराव यांच्याशी झुंज झाली आणि यात ते मृत्यूमुखी पडले.
यामुळे या किल्ल्याचा कारभार सांभाळणारे त्यांचे गणपतराव हे सैरभैर झाले. आपली काही धडगत नाही, शिवाय इंग्रज सरकार या घटनेचा फायदा घेवून आपल्यावर कारवाई करुन जप्ती आणतील या शंकेतून त्यांनी हा किल्ला एक जैन व्यापारी आब्बड यांना विकला. हा किल्ला अहिल्याबाईंनी आपले जावई सरदार यशवंतराव फणसे यांना कन्यादानात मुलखाची जहागिरीसह दिला. लासलगाव व निफाड प्रांताचे पाटीलकीचे दिले होते. सरदार फणसे घराण्याला यात्रेचा मान, कर वसूली, शिक्षा देणे असे अनेक अधिकार लासलगाव व निफाड प्रांतात प्रदान करण्यात आले.
नंतर 1818 मध्ये मराठा सत्तेचा अस्त झाल्यावर इंग्रज काळात पाटीलकीचे वतन वंश परंंपरागत फणसेंकडे आले. लासलगावचा व नाशिकचा पाटिलकीचा बिल्ला नाशिक कलेक्टरने 1937 ला दिला. नंतर भारत स्वतंत्र सर्व संस्थाने भारतात विलीन झाली. 1952 ला वंशपरंपरागत पाटीलकी रद्द करण्यात आली. त्यामध्ये सरदार फणसेंचीही पाटीलकी रद्द झाली. आजही किल्ला खासगी मालकीत राहिला. त्याला भक्कम अशी तटबंदी आहे.
भले मोठे महाद्वार आहे. आतमध्ये आता सिमेंटची काही घरे उभी राहिली आहेत. जुन्या इमारती, आतले काही लाकडी, दगडी व विटांचे बांधकाम कोसळण्याच्या स्थितीत आहे. आतमध्ये लाकडाचे सुंदर कोरीव काम केलेला फार मोठा दरवाजा आहे. महाराष्ट्रातील इतर किल्ल्यांप्रमाणे हा सुद्धा फार भक्कम आहे. आज जरी तो चहुबाजूंनी घरांनी वेढलेला असला तरी तो ऐतिहासिक शान शोभावा इतका सुस्थितीत आहे. व हाच किल्ला लासलगावची नव्हे आपल्या इतिहासाची शान आहे.
लासलगाव ता.निफाड जि.नाशिक येथील राणी अहिल्यादेवी होळकर यांनी निर्माण केलेला भुईकोट किल्ला सध्या खाजगी मालकीमुळे दुर्लक्षित आहे. दुर्ग संवर्धन प्रतिष्ठान यांच्या ४० व्या मोहिमे अंतर्गत या किल्ल्याचे संवर्धन करण्यात आले, त्यामुळे त्यांचे प्रथमतः होळकर राजघराण परिवारातर्फे जाहीर आभार. या मोहिमेत बुरुजावरील कचरा स्वच्छ करण्यात आला. मोहिमेत संस्थेचे अध्यक्ष प्रा.आनंद बोरा, भीमराव राजोळे, चंद्रकांत दुसाने, भाऊसाहेब राजोळे, आशिष बनकर, आकाश जाधव, सागर बनकर, धनंजय बागड, सागर घोलप, अजित जगताप, समीर ठाकूर आदी सहभागी होते. लासलगावचा भुईकोट किल्ला "अहिल्यादेवींचा किल्ला" या नावाने ओळखला जातो. राणी अहिल्यादेवी होळकर आणि लासलगावचा भुईकोट किल्ला यांचा इतिहास लवकरच आपल्यासमोर सविस्तर मांडू.
आभार : प्रा.आनंद बोरा
नाशिकमधील ऐतिहासिक मंदिरातील शिलालेखांचा अखेर झाला उलगडा; नेमका काय आहे अर्थ?
अप्पाजी गणेश वैद्य थोरल्या माधवराव पेशव्यांचे सख्खे साडू होते. ते पूर्वी अहमदाबादला सुभेदार होते. पेशव्यांनी त्यांना लाखलगावची जहागिरी दिली. त्यांचा वाडा आजही पाहता येतो. लक्ष्मण कृष्णा, शिवराम कृष्णा फाटक आणि वैद्य यांचे संबंध नेमके काय होते, याचा उलगडा होण्यास हे शिलालेख इतिहास अभ्यासकांना उपयुक्त ठरतील, अशी अपेक्षाही दुधाणे व्यक्त करतात.
गवळ्यांच गौळाणे अन् बहुल्याचे आंबे
प्रत्येक गाव आपला एक ठसा इतिहासावर उमटवूनवाटचाल करीत असतं. तर अनेकदा एखादा किल्ला अथवा लेणी आपल्या अवतीभवतीच्या गावांच्या निर्मित्तीला कारणीभूत ठरल्याने इतिहासाच्या पाऊलखुणा झालेल्या दिसतात. पांडवलेणीच्या पाठीवरील गौळाणे अन् बहुला किल्ल्यांच्या सावलीतील आंबे बहुला आजही तो इतिहास जागवतात.
दोन हजार वर्षांपूर्वीच्या इतिहासाचे धडे देणारी त्रिरश्मी डोंगरावरील पांडवलेणी (बौद्धलेणी) अनेक गूढ आपल्या उदरात घेऊन आहे. पांडवलेणी घडताना पांडवलेणीच्या आजूबाजूच्या गावांचे स्वरूप काय असेल हा विषय संशोधनाचा ठरावा. पांडवलेणीतील शिलालेखांतून अनेक गावे, नद्या, राजे व व्यापाऱ्यांचा उल्लेख आलेला आहे. यातील अनेक गावांच्या नावांचा आता संदर्भ लावता येत नाही. तर अनेक गावांची नाव बदलल्याने ती सापडतही नाहीत. मात्र दोन हजार वर्षांपूर्वी नाशिक व गोवर्धन या गावांचा पांडवलेणीतील शिलालेखांमध्ये स्पष्टपणे झालेला उल्लेख आजही तसाच आहे. गोवर्धन आहारातील पूर्व मार्गावरील शाल्मलीपद्र गाव हे सातपूर असावे. (काही संशोधक हे निफाडजवळचे सावरगाव असावे असा अंदाज लावतात.) तर पांडवलेणीच्या उजव्या हाताला म्हणजे अगदी पायथ्यालाच असेलेले पाथर्डी हे गाव शिलालेखांमधील पिशाच्यपद्र हे गाव असावे, असा संशोधकांचा अंदाज आहे.
पांडवलेणीचे
खोदकाम करण्यासाठीच्या कामगारांची अथवा पाथरटांची पाथर्डी ही वसाहत आजही
आपल्या खाणाखुणा सांभाळून असल्याचे दिसते. तेथे सापडणारे अवशेष त्याची
साक्ष देतात. पांडवलेणीतील बौद्ध भिक्षुकांना गरजेच्या गोष्टी
पुरविण्यासाठी राजांनी व व्यापाऱ्यांनी चिवर (कपडे) व औषधांची सोय केल्याचा
उल्लेखही शिलालेखांमध्ये आला आहे. याची सोय पूर्वी कापडासाठी प्रसिद्ध
असणाऱ्या गोवर्धनमधून होत असावी. तर भिक्षुकांच्या उदरनिर्वाहासाठी गायींचे
दान दिल्याचा उल्लेखही लेणीमधील शिलालेखांमध्ये आढळतो. याचाच अर्थ
लेणीच्या आजूबाजूच्या एखाद्या गोवर्धन सारख्या गावात या गाई सांभाळण्यासाठी
दिल्या जात असाव्यात व तेथून भिक्षुकांना दुधाची सोय होत असावी. तसेच
पांडवलेणी त्रिरश्मी डोंगरावरच का कोरली असावी, या प्रश्नाचे उत्तर दोन
हजार वर्षांनंतरही तर्कविर्तकांवर आधारलेले आहे. लोकवस्तीपासून लांब पण
भिक्षुकांना सहज वावरता येईल व त्यांच्या गरजाही पूर्ण होऊ शकतील, असे
ठिकाण त्रिरश्मी पर्वत होते. पांडवलेणीसमोर गोदावरी व मागील बाजूस वालदेवी
नदी यामुळे या दोन्ही नद्यांच्या मधोमध हा डोंगर असल्याने येथे पांडवलेणी
साकारल्या असाव्यात. याचा संबंध पांडवलेणीच्या मागील पूर्वी दुधासाठी
प्रसिद्ध असलेले गवळी लोकांचे गौळाणे हे गाव पांडवलेणीच्या प्रवासादरम्यान
वसले असावे, असा ऋणानुबंध गौळाणे उलगडताना दिसतो.
पांडव
लेणीच्या पायथ्याशी असलेल्या पाथर्डी गावातून गौळाणे गावात जाता येते.
साधारण तीन किलोमीटरवर एक चौफुली लागते. चौफुलीवर वीर बाबाचे मंदिर आहे.
तेथून डाव्या हाताच्या रस्त्याने गौळाणे गावाकडे रस्ता जातो. वालदेवी
नदीच्या कुशीत गौळाणे हे गाव वसले आहे. अडीच हजार लोकसंख्येच्या गावात
आदिवासी कुटुंबीयांचीही काही घरे आहेत. गावात एकमुखी दत्त मंदिर, सप्तशृंगी
देवी, विठ्ठल मंदिर, महादेव मंदिर व चाणसनबाबांचा दर्गा आहे. मात्र गावाची
एक विशेष ओळख आहे ती पूर्वी हे गाव गवळ्यांचे गाव होते. गावातील गवळी
मंडळी दुधाचा व्यवसाय मोठ्या प्रमाणात करीत असल्याने दुधासाठी हे गाव
प्रसिद्ध होते. त्रिरश्मी डोंगरामागे असलेल्या या गावात गवळी स्थिरावण्याचे
कारण पांडव लेणी असावे, असेही ग्रामस्थ मानतात. मात्र पांडवलेणीत तसा थेट
उल्लेख आलेला नाही. मात्र भिक्षुकांच्या उपजिवेकेसाठी दुधाची गरज हे गाव
भागवित तर नसेल, याबाबत आता फक्त तर्कविर्तकच लावले जावू शकतात. मात्र आता
गवळी मंडळी गावात नसल्याने दुधाचा व्यवसायही केव्हाच बंद झाला, असेही
रामदास चुंभळे सांगतात.
गौळाणेचे सध्याचे वैशिष्ट्य आहे गावातील हनुमान. हनुमान मंदिरातील हनुमानाची मूर्ती नग्न आहे. सध्या हेच गौळाणेचे मुख्य आकर्षणही आहे. अंजनेरीवर हनुमानाने जन्म घेतल्यानंतर बाल हनुमानाने पहिली उडी गौळाणेत मारली होती. त्यावेळी बाल हनुमान नग्न अवस्थेत होते त्यामुळे गावातील हनुमान मूर्ती नग्न आहे, अशी अख्यायिका चुंभळे सांगतात. गावातील हनुमानाच्या मंदिरातील नग्न हनुमानाची मूर्ती व शेंदूर फासलेल्या एक वीरगळीसारख्या दगडी चिरेवर गणपती व गाईंची प्रतिमा कोरल्यासारखे दिसते. शेंदूरामुळे यावरील चित्रे अस्पष्ट झालेली आहेत. हे मंदिर नव्याने बांधण्यात आले आहे. हनुमान मंदिरापासून डाव्या हाताने वालदेवी नदीकडे रस्ता जातो. नदीच्या लगत महादेव मंदिर नव्याने बांधलेले आहे. त्याच्या पायऱ्या नदीपात्रातील स्वच्छ पाण्याकडे घेऊन जातात. हा परिसरच निसर्गरम्य आहे. निसर्ग अनुभवताना समोर नाकिंद्याचा किल्ला दिसतो. गौळाणेकर पगडीसारखा दिसणाऱ्या डोंगराला नाकिंद्याचा किल्ला म्हणतात, असे वाघू थापेकर, मुकुंद तपासे व विजय चुंभळे सांगतात. नाकिंदा लक्ष वेधून घेतो. गौळाणेकरांचा नाकिंदा म्हणजेच आंबे बहुल्याचा बहुला किल्ला.
बहुल्याचे आंबे बहुला
गौळाणेतूनच आंबे बहुला गावात रस्ता जातो. अगदी तीन किलोमीटरवर हे गाव लागतं. वालदेवीच्या किनारी एखाद्या घरांचा पुंजका वसावा असे हे गाव वसलेलं आहे. असं वाटण्यामागे एक विशेष कारणही आहे. लष्करांने देवळाली कॅम्प वसविले अन् १९४४ दरम्यान फायरिंग रेंजसाठी मोठ्या प्रमाणात जागा ताब्यात घेतल्या. यात आंबे बहुला हे गावही गेले. त्यामुळे नदीपलीकडे बहुला किल्ल्याच्या पायथ्याशी असलेले आंबे बहुला हे गाव नदी ओलांडून आताच्या जागेत वसले आहे. याला आता ६०-७० वर्ष झाल्याचे येथील ग्रामस्थ सांगतात. त्यामुळे गावात जुनं अस काहीच नाही. जी काही मंदिरे आहेत ती नंतर ग्रामस्थांनी नव्याने उभारलेली आहेत. यात मारूती, सप्तशृंगी, भैरवनाथ, राम, भवानी मंदिराचा समावेश होतो. आंबे बहुलेकरांची ग्रामदैवत म्हणजे भैरोबा.
भैरोबाचे जुन्या मंदिर आधीच्या गावातही आहे. ते तसेच असल्याचे सुरेश शिर्के व शशीकला गवारी सांगतात. नदीपलीकडे जुन्या गावात पूर्वी आंब्याची खुप झाडे होती म्हणून गावाला आंबे अन् बहुला किल्ल्याच्या पायथ्याचे हे गाव असल्याने गावाला आंबे बहुला असे नाव पडले. एस. पी. परमहंस यांच्या महाभारत शब्दकोशात बहुलाचा उल्लेख नदी म्हणून आला आहे. तर बहुला हे गणेशव्रत म्हणूनही ओळखले जाते. यामुळे बहुला या नावाभवतीचे गूढ उलगडत नाही. मात्र बहुला किल्ल्याच्या पायथ्याशी वालदेवी नदी वाहत असल्याने या नदीच्या सहवासात किल्ला असल्याने किल्ल्याला बहुला म्हटले गेले हेही उलगडत नाही. गावात आदिवासी लोकवस्ती जास्त आहे.
मूळच्या आंबे बहुल्यातून देशमुख मंडळी मोठ्या प्रमाणात भगूर, आडगाव, वडनेर, सुकेणे, नाशिकरोड भागात स्थलांतरीत झाली आहेत. ही मंडळीही किल्ल्यामुळे पायथ्याच्या या गावात वसली असावी. गावातील ग्रामस्थांच्या जमिनी लष्करासाठी घ्याव्या लागल्याने सर्वच अल्पभूधारक झाले आहेत. अजूनही त्या जमिनींचा मोबदला मिळाला नसल्याने गाव मोबदल्यासाठी लढताना दिसते, असे राजू देशमुख सांगतात. सध्याच्या गावाभवती वन विभागाची जमीन असल्याने गावचा पुरेसा विकासही होत नसल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे. परंतु आजही आंबे बहुल्याचे मुख्य आकर्षण आहे ते बहुला किल्ला. बहुला किल्ल्याच्या इतिहासात फारशा नोंदी मिळत नाहीत. मात्र बहुला किल्ल्याचे आकर्षण भल्याभल्यांना सोडवित नाही. अर्थात बहुला किल्ल्यावर जायला बंदी आहे. कारण हा किल्ला लष्कराच्या फायरिंग रेंजचा एक भाग आहे. रविवारी फायरिंग बंद असल्याने गिर्यारोहक किल्ल्यावर जातात; मात्र तोफांचे जिंवत गोळे इतरत्र पसरले असल्याने आंबे बहुल्यातील ग्रामस्थ तेथे जाणे धोक्याचे असल्याचे सांगतात. बहुला किल्ल्याची उंची ९६५ मीटर आहे. हा किल्ला सुरूवातीला मोगलांकडे असावा व मोगलांकडून मराठ्यांच्या ताब्यात आला असावा अशा काही नोंदी मिळतात. १८१८ नंतर पेशवाईचा अस्त झाल्यानंतर इंग्रज कॅप्टन जॉन ब्रिग्जने बहुला किल्ल्याचा ताबा घेतला व त्याचे नुकसान केले, अशी नोंद नाशिक गॅझेटियरमध्ये मिळते. बहुला किल्ल्याची तटबंदी आता बऱ्यापैकी ढासळली आहे; मात्र तोफांपासून किल्ल्यांचे संरक्षण व्हावे, अशी किल्ल्याची तटबंदी असल्याचा उल्लेख कॅ. ब्रिग्ज करतो. त्यामुळे दररोज तोफांचे वार सोसूनही हा किल्ला आजही उभा आहे, अशी माहिती गिर्यारोहक सुदर्शन कुलथे देतात.
बहुला किल्लाचे उद्धवस्त झालेले प्रवेशद्वार व कातळात कोरलेल्या उभट पायऱ्या, पाण्याचे चार टाके, अश्मवर्तुळासारखी समाधी, काताळातील चौकोनी छिद्रांचे रिंगण हे बुरजाचा पाया असावे, उद्धवस्त झालेल्या दोन वास्तूंचे अवशेष व लहानसा बहुल्याचा माथा पाहिला की नवलं वाटतं. बहुल्याचा वापरही त्रिंगलवाडी सारखा वाटेवर नजर ठेवण्यासाठी झाला असावा. खरेतर हा किल्ला नाशिक शहरात प्रवेशद्वारावरच असल्याने बहुलाचे महत्त्व मोठे आहे. मात्र तो लष्कराच्या ताब्यात असल्याने तो नियमित पाहता येत नाही. अन्यथा तोही रामशेज सारखा ठरला असता, असे मतही कुलथे व्यक्त करतात. बहुल्याच्या माथ्यावरून महांकाळ डोंगर, औंढा, पट्टा, बितनगड, शेणीत सुळका, पश्चिमेला अलंग-मदन-कुलंग, कळसूबाई, वायव्येला गडगडा, रायगड डोंगर, डांग्या सुळका, इगतपुरीचा पसारा, उत्तरेला अंजनेरी व रांजणगिरी, ईशान्येला त्रिरश्मी डोंगर अन् विस्तारत चाललेलं नाशिक पहायला मिळतं. गौळाणेतील वीट भट्ट्या अन् महापालिकेचा खत प्रकल्प आकाशात ढग तयार करतानाही दिसतो.
शिंगवे बहुला, नांदूर बहुला, अस्वली बहुला, राजूर बहुला व आंबे बहुला या गावांवर बहुला किल्ल्याचा ठसा दिसतो तर पांडवलेणीच्या अवतीभवतीची गावे व त्या गावातील व्यवसाय पांडवलेणीच्या उद्देशांशी जोडली गेली असल्याचे पहायला मिळते. ही गावे भटकतांना त्या काळच्या जीवनशैलीचा स्पर्श आपल्याला होताना अनुभवायला मिळतो. म्हणूनच शहराच्या अगदी जवळची अन् इतिहासाच्या पैलूतून निर्माण झालेली ही गावे नक्कीच पहायला हवीत. कारण अजून काही वर्षांनी या गावांतील खाणाखुणांची जागा शहरातील उंच उंच इमारती घेताना दिसली तर नवलं वाटायला नको.
इतिहास फुलविणारे अनकाई
एखाद्या गावाला इतकं काही ऐतिहासिक वैभव लाभलेलं असतं की, आपणही त्या गावचेचं होऊन जावं असं वाटायला लागतं. यादवांच्या काळात बांधला गेलेला अनकाई-टनकाई किल्ला व जैन लेणींच्या पायथ्याचे अनकाई गाव हे आपल्याला वेगळ्याच विश्वात घेऊन जातं.
नाशिक जिल्ह्याच्या दऱ्याखोऱ्यांना गडकिल्ल्यांचे कोंदण लाभलेले आहे. सेलबारी, डोलबारी, दुधेश्वर उपरांग, त्र्यंबकरांग, पेठ उपरांग, सातमाळ रांग, नाशिकची नैर्ऋत्य व वायव्य उपरांग, चणकापूर डोंगररांग, गाळणा टेकड्या गडकिल्ल्यांनी गजबजलेल्या आहेत. नुसत्याच गजबजलेल्याही नाहीत तर या प्रत्येक गडकोटांचे वेगळेपण त्यांच्या ठायी दडलेलं आहे. प्रत्येक किल्ल्याचा इतिहास मात्र विखुरलेल्या अवस्थेत आहे. तो किल्ला कोणी, कधी बांधला अन् कशासाठी बांधला. त्याभोवतीच्या ऐतिहासिक घडामोडी अन् शौर्य नोंदविण्याची गरज आहे. गाळणा रांगेतील येवल्याजवळील अनकाई-टनकाई किल्ल्याचीही ती अवस्था पहायला मिळते. अनकाई डोंगरावरील किल्ल्याचा उपयोग यादव काळापूर्वीपासून टेहळणी नाका म्हणून केला जात असे. हा किल्ला यादवकालीन असून, देवगिरीचे यादव सम्राट सिंघणाच्या (इ.स.१२००-१२४७) कारर्कीदीत तो परमारांच्या ताब्यात होता. यादवांनी परमारांचा किल्लेदार श्रीधर याला फितूर करून हा किल्ला जिंकला, असे पुरातत्त्वज्ञ डॉ. ओ. पी. वर्मा यांनी नोंदविले आहे. अनकाईचे लिखित पुरावे फारसे मिळत नाहीत. मात्र मुघल बादशहा शहाजहान याचा सुभेदार खानखनान याने अलका-पलका किल्ला जिंकून घेतला यावेळी अनकाई-टनकाई हा किल्लाही इ. स. १६३५ मध्ये जिंकल्याचा उल्लेख मिळतो. १६९३ मध्ये सुलेमानबेग हा अनकाई-टनकाईचा किल्लेदार असल्याचा उल्लेख मिळतो. पेशव्यांनीही अनकाई-टनकाई आपल्या ताब्यात असावा यासाठी धडपड केलेली दिसते. १७३४ च्या शेवगावच्या तहानुसार किल्ला मराठ्यांना देण्याचे निजामाने कबुल केले; मात्र निजामाचा अधिकारी व किल्लेदार अब्दुल अझिजखान याने हा किल्ला मराठ्यांना देण्यास नकार दिला. यामुळे पेशवा-निजामात संघर्ष वाढला. अखेर १७५२ च्या मराठे-निजाम यांच्यात भालकीचा तह झाला. या तहानुसार अनकाई मराठ्यांच्या ताब्यात आला. त्यानंतर अनकाई १८१८ पर्यंत मराठ्यांच्या ताब्यात होता. पेशवाईचा अस्त झाल्याने ४ एप्रिल १८१८ रोजी कॅ. मॅकडॉवेल यांनी अनकाईच्या किल्लेदाराशी वाटाघाटी सुरू केल्या; त्यात यश येत नसल्याचे पाहून मॅकडॉवेलने ५ एप्रिलला सहा पौंडी तोफांचा मारा किल्ल्यावर सुरू केला. या हल्ल्याने किल्लेदार शरण आल्याने अनकाई इंग्रजांच्या हाती आला. यावेळी मराठ्यांचे ३०० सैनिक व ४० तोफा किल्ल्यात होत्या. अनकाई-टनकाईची भक्कम तटबंदी हार खाण्यासाठी नव्हतीच हे आजही ती दाखविते. अनकाईचा इतिहास सतराव्या-अठराव्या शतकापुरताच मर्यादित नाही. तर अनकाई-टनकाई किल्ल्याच्या पायथ्याशी असलेले जैन लेणीच्या कुशीत स्थिरावलेले अनकाई गाव व लेणी आपल्याला अगदी दहाव्या शतकाची सफर घडवून आणतात. गावातील अनेक वास्तू अनकाईवर पुरातत्त्वीय अन् इतिहासाच्या अंगाने खूप काम करण्याची गरज असल्याचे व्यक्त करतात.
नाशिकहून येवल्यात आलात की मनमाड मार्गावर दहा-बारा किलोमीटरवर अनकाई हे गाव आहे. अनकाई फाट्यावरून उजव्या हाताने वळालात की समोर अनकाई-टनकाई जोडगोळी डोंगर खांद्यावर किल्ला घेऊन मिरविताना दिसतो. जसजसे आपण जवळ जाल तसे हे दोघे हातीची कडी करून फुगडी खेळता-खेळता आपल्याला पाहून स्तब्ध झाल्यासारखे उभे असल्याचा भास होतो. दोघांचे हात किल्ल्यांचे बुरूज व तटबंदीने गुंफल्यासारखे वाटायला लागते. रेल्वेच्या पुलाखालून जाताना डोक्यावरून धावणारी रेल्वे मलाही किल्ला पहायचाय असं म्हणत पुढे धावत जाते, असे वाटते. अर्थात अनकाई-टनकाई पाहण्याची भुरळ फक्त आपल्यालाच पडली असे नाही तर परदेशी प्रवाशांनाही पडल्याचे दिसते. भारतात व्यापाराच्या निमित्ताने आलेल्या डच, पोर्तुगीज, ब्रिटिशांनी सोळाव्या शतकापासून प्रवेश करण्यास सुरुवात केली. यात फ्रान्स शेवटचा (कालखंड इ.स. १६६४ ते १९५४) होता. याच दरम्यान, झां बातीस्त ताव्हेर्न्ये, फ्रान्स्वा बर्निअर व थेवेनॉट यांसारख्या प्रवाशांनी फ्रान्समध्ये भारताबद्दल बरीच उत्सुकता निर्माण केली होती. १६६५ मध्ये थेवेनॉट याने सुरत-औरंगाबाद मार्गावरील अनकाई हे एक मुख्य ठाणे असल्याचा उल्लेख केला आहे. थेवेनॉटच्या आठवणींसह आपण अनकाई गावात दाखल होतो. आपल्या आजूबाजूला अनेक मंदिरे व उघड्यावर पडलेल्या भग्नमूर्ती पहायला मिळतात. पर्यटकांसाठी राहण्याची सोय म्हणून येथे गावाने मोफत गेस्ट हाऊसची व्यवस्थाही केली आहे. खरं तर येथे उघड्यावर पडलेल्या भग्नमूर्ती, शिल्पांचे सुंदर संग्रहालय गेस्ट हाऊसच्या आवारात होऊ शकते. या गेस्ट हाऊससमोरील उघड्यावर ठेवलेली गणेश मूर्ती व वीरगळ पाहून मागील बाजूच्या अनकाईच्या भग्न वेशीकडे वळायचे. दगडी बांधणीची वेस दिसायला सुंदर आहे; मात्र तिचा वरचा भाग ढासळला आहे. वेशीच्या एका भिंतीला जैन तीर्थंकारांची मूर्ती व त्या मूर्तीच्या माथ्यावर गजलक्ष्मी शिल्प कोरलेले दिसते. वेशीतून गावात गेल्यावर समोर दगडी मठ पहायला मिळतो. अशीच एक वास्तू अनकाई-टनकाई किल्ल्याकडे जाताना लेणींच्या आधी डाव्या हाताला लागते.
अनकाई डोंगराच्या पायथ्यापासून शंभर एक पायऱ्या चढल्यावर जैन लेणी लागते. गावातून लेणीपर्यंत व तेथून किल्ल्यापर्यंत पायऱ्यांची व्यवस्था करण्यात आली आहे. त्यामुळे फार दमछाक होत नाही. भौगोलिक दृष्ट्या ही लेणी टनकाईच्या पोटात आहे. बर्जेसने पश्चिम भारतातील लेण्यांवर केलेल्या लिखाणात फक्त सात लेण्यांचा समूह असल्याचा उल्लेख आहे. मात्र त्याठिकाणी वरच्या रांगेत एकूण आठ व त्याखालील रांगेत दोन अशा दहा लेण्या आढळतात. लेणी परिसरात पाण्याचे चार टाके आहेत. या लेणी दहाव्या अकराव्या शतकात कोरलेल्या असाव्यात. येथे लेणी क्रमांक ३ वर एक शिलालेखही आहे. मात्र तो पुसट झाल्याने त्याचे वाचन करता येत नाही. लेणी क्रमांक दोन मध्ये अनकाई देवी आहे. इतर लेण्यांमध्ये तीर्थंकरांच्या मूर्ती, द्वारशिल्पे अन् गूढ वाढविणाऱ्या मूर्ती पहायला मिळतात. तर काही मूर्तींच्या पायथ्याला शिलालेख कोरले आहेत. जैन लेणी केंद्रीय पुरातत्त्व विभागातर्फे सुरक्षित वास्तू घोषित करण्यात आली आहे. त्यामुळे लेणीची व्यवस्था चांगली ठेवल्याचे दिसते. मात्र लेणी पाहताना वटवाघळांचा त्रास पर्यटकांना व लेणीलाही होत असल्याचे तेथील अवस्थेवरून लक्षात येते. लेणीचा सोहळा अनुभवून तसेच पायऱ्यांनी पुढे निघाल्यास अनकाई-टनकाई ज्या खिंडीत हातातहात घेऊन पहूडली आहे तेथील बुरूज अन् तटबंदी आपल्याला आकर्षित करते.
यादवकालीन एका ताम्रपटात (इसवी सन ९७४) अनकाई किल्ल्याचा उल्लेख ‘एनकाई दुर्ग’ असा केलेला आहे. किल्ला अनकाई-टनकाई असे म्हटले जात असले तरी गावाचे नाव फक्त अनकाई आहे. लेणीतील अनकाई देवीमुळे गावाला हे नाव पडल्याचे ग्रामस्थ सांगतात. तर टनकाई हा अनकाईचाच एक भाग असलेला किल्ला आहे. मात्र टनकाई हे नावही टाकाई-टुकाई देवी मंदिरामुळे पडल्याचे ग्रामस्थ सांगतात. हे मंदिर मनमाड मार्गावर किल्ल्यापासून जवळच आहे. रामायणकाळात अनकाई-टनकाईवर अगस्ती मुनींचे वास्तव्य होते. सीतेचे हरण झाल्यानंतर सीतेला शोधण्यासाठी निघालेल्या रामाची व अगस्तींची येथेच भेट झाली होती. यावेळी अगस्तींनी श्रीरामाला नांदगावच्या नस्तनपूर येथे जाऊन शनीदेवाची आराधना करण्यास सांगितले होते, अशी अख्यायिकाही ग्रामस्थ सांगतात. किल्ल्यावर अगस्तींची गुफाही आहे. तेथे अगस्ती ऋषींची मूर्ती व पाण्याचे तळे आहे. या तळ्याला काशी तळे असेही म्हटले जाते. या तळ्याच्या मधोमध अगस्तींची समाधी असल्याचेही ग्रामस्थ सांगतात. श्रावणात महिनाभर अगस्तींची यात्रा भरते. श्रावणातील दर सोमवारी मोठ्या संख्येने भाविक अनकाईला येतात. अनकाईवर मच्छिद्रनाथांची समाधी असल्याचेही ग्रामस्थ मानतात. त्यांना मोठा बाबा असेही म्हटले जाते. अल्लाउद्दीन खिलजीने महाराष्ट्रावर स्वारी केली तेव्हा अनकाई किल्ला व लेणीची मोडतोड केली होती. त्यानंतर अनकाई-टनकाई मोगलांच्या ताब्यात गेला. विठ्ठल शिवदेव विंचूरकर यांचे थोरले पूत्र शिवाजीपंत बापू यांनी निजामाशी युद्ध करून अनकाई मिळविला. अनवती (अनकाई) गावाजवळ हैजरच्या तोफ खाण्यावर विठ्ठल शिवदेव यांनी हल्ला केला. तेव्हा मिळालेल्या तोफातून थोरल्या माधवराव पेशव्यांनी दोन तोफा विठ्ठल शिवदेव यांना १६७४ मध्ये बक्षीस दिल्या. त्या त्यांनी अनकाई किल्ल्यावर आणून ठेवल्या. अनकाई टनकाई पेशवाईत इंग्रजांच्या हाती पडला. किल्ला भग्नावस्थेत असून किल्ल्याची तटबंदी व सात मजबूत दरवाजे, किल्ल्यावरील मंदिरे, गुफा, माथ्याचा परिसर, पाण्याचे टाके, हिंदू लेणी तळे, वाडा व इमारतींचे अनेक अवशेष पाहिले की किल्ल्याचा वापर अन् त्याच्यावर घडलेल्या ऐतिहासिक घटनांची उकल होते. अनकाईच्या उत्तरेकडे बाहेर पडण्यासाठी भुयारी रस्ताही आहे. किल्ल्यावरही दोन तीन ब्राह्मण लेणी आहेत. यात काही देवतांच्या मूर्ती आहेत. अनकाई किल्ला राज्य पुरातत्त्व विभागाने संरक्षित घोषित केला आहे. टनकाईवर जाताना प्रवेशद्वार, वाड्याचे अवशेष, पाण्याचे तळे व दोन-तीन टाके, थोडीफार तटबंदी पहायला मिळते. टनकाईवर दगडीबांधणीचे शिवमंदिर आहे. किल्ल्यावरही अनेक ठिकाणी मूर्ती विखुरलेल्या अवस्थेत पडलेल्या पहायला मिळतात. ‘नाशिक जिल्ह्यात गाळणा किल्ला सोडला तर इतकी मजबूत तटबंदी अनकाई-टनकाईवरच आढळते,’ असा उल्लेख नाशिक गॅझेटियरमध्ये आला आहे. अगस्ती ऋषी, जैन तीर्थंकर व मच्छिंद्रनाथांचा सहवासामुळे अनकाई-टनकाई ऋषीमुनींचे आवडते ठिकाण असल्याचे कपिलगीतेवरून स्पष्ट होते. ‘कपिलगीता’ या धार्मिक ग्रंथावर १४६ वर्षांपूर्वी लिहिलेल्या टीकेच्या मूळ प्रती सोमठाणदेश येथील इतिहास अभ्यासक सुधाकर पगारे यांच्याकडे आहेत. शके १७९१ म्हणजे इ.स. १८६९ मध्ये दामोदर माधवराव यांनी ही टीका रचली. त्यांचे पूर्वज सदाशिव यांनी मूळच्या कपीलगीतेची रचना शके १७४१ म्हणजे इ. स.१८१९ मध्ये केल्याचा उल्लेख ‘येवला यथादर्शन’ या पुस्तकात आला आहे.
अनकाई-टनकाई किल्ला पाहून पुन्हा खिंडीत यायचे. पायऱ्यांनी खाली उतरताना जैन लेणी न्याहाळायची अन् पुन्हा वेशीपाशी हजर व्हायचे. गाव बदलत आहे त्याप्रमाणे गावची मोडकळीस आलेली वेसही दुरूस्त करण्याचा मानस ग्रामस्थ व्यक्त करतात. अनकाई माता मंदिराप्रमाणेच गावात खंडोबा, हनुमान, महादेव मंदिरे आहेत. गावात पूर्वी आखाडीचा कार्यक्रम आठ दिवस साजरा केला जाई व यात विविध सोंगे नाचविली जात, अशी माहिती, सुधीर जाधव, अशोक बोराडे व आनंद वैद्य यांनी दिली. अनकाई किल्ला व आसपासच्या परिसरात पुरातत्त्व खात्यामार्फत उत्खनन झाल्यास मोठा इतिहास समोर येऊ शकतो, अशी अपेक्षा इतिहास अभ्यासक नारायण क्षीरसागर व्यक्त करतात. अनकाईचा प्रवास येथेच संपला असे म्हणतानाच गावातील पूर्वेला सतीमंदिर व बारव आहे ती नक्की पहा, असे गावातील रविंद्र देवकर यांनी सांगितले अन् आमची पावलं झपाझपा तिकडं वळाली. सुरूवातीला लहानशी विहीर पहायला मिळाली. त्याला ग्रामस्थ सरोवर म्हणतात. त्याच्या आजूबाजूला मंदिराचे अनेक अवशेष विखुरलेले पहायला मिळाले. या परिसरात दगडी बांधणीची अनेक मंदिरे असणार यात शंका नाही. विहिरीजवळ जनावरांसाठी पाणी ठेवण्याचे मोठे दगडी पात्र पहायला मिळते. तेथून उत्तरकडे नजर टाकली की सहा-सात फूट उंच गवतामध्ये काळाशार कळस डोकावताना दिसला. एखाद्या मोठ्या मंदिराची लहानशी प्रतिकृती उभारल्यासारखा भास या वास्तूकडे पाहिल्यावर झाला. लहानसे प्रवेशद्वार, आतमध्ये मंदिराभवतीचा परिसर तोही लहान, मंदिराच्या बाहेरील सीमाभिंतीही लहान अन् मूळ मंदिरही लहानच प्रतिकृतीसारखे. ही वास्तू फासना शैलीची भासते. मंदिराचे शिखर अष्टकोनी असल्याने ते वैशिष्ट्यपूर्ण आहे. कळसावर कोरलेले चार मुख व त्याच्या दोन्ही बाजूला चार सिंहाच्या प्रतिमा कोरलेल्या आहेत. गाभाऱ्याचे प्रवेशद्वारही लहानच. समाधीसारखे भासणा-या वास्तूला अनकाईकर सतीमंदिर म्हणतात. गाभाऱ्यात विठ्ठल रूक्माईसारख्या दिसणाऱ्या भग्न मूर्ती आहेत. मात्र त्या नंतरच्या काळात बसविलेल्या असाव्यात. अनकाईवर येणाऱ्यांची पावले याकडे माहितीअभावी वळत नाहीत. ही वास्तू नेमकी काय असेल यावर संशोधनाला वाव आहे. मजबूत बांध्याचे जोडगोळी किल्ले, मठासारख्या दोन वास्तू, गावची वेस, विखुरलेल्या मूर्ती, लेणीचे कोंदण अन् अज्ञात वास्तूंचे वैभव यासह मनात अनेक प्रश्न, नव्याने काही तरी हाती लागल्याचं समाधान परतीचा प्रवास आनंदी करतो. चला, तर अनकाईची अनोखी रूपे अनुभवायला.
हिरेखानाचे सोनांबे
इतिहास
नोंदविला गेला नाही अथवा त्याच्या नोंदी पुढे आल्या नाहीत तर काय होते. हे
अनुभवायचे असेल तर नाशिकमधील अनेक गावे याची उत्तम उदाहरणं म्हणायला हवीत.
पिढ्यांपिढ्या ऐकत आलेल्या गोष्टींवर अनेक गावांचा इतिहास तग धरून उभा
आहे. अशीच काहीशी परिस्थिती सिन्नर तालुक्यातील सोनांबे या गावाचीही आहे.
नाशिकच्या
नसानसात ऐतिहासिक ऐश्वर्य अन् शौर्य दडलेलं आहे. त्याच्या पाऊलखुणा
गावागावांमध्ये आजही अनुभवयाला मिळतात. मात्र या पराक्रमी आणि इतिहास
घडविणाऱ्या रणधुरंधरांचा इतिहास अजूनही अज्ञातवासात खितपत पडलेला दिसतो.
त्यांच्या शौर्याला त्यांनी उभारलेल्या ऐश्वर्यसंपन्न इतिहासाला पुनर्वैभव
मिळवून देण्याची अज्ञातवासात असलेला इतिहासाला झळाळी देण्याची गरज आहे.
सातवाहन ते यादव कालखंड, मुस्लिम राजसत्ता, त्यानंतर आलेला शिवकाळ अन्
पेशवाईच्या काळात नाशिकमध्ये मोठे बदल झाले.
पेशव्यांच्या अनेक सरदारांना नाशिक परिसरातील गावांच्या जहागिऱ्या मिळाल्यामुळे त्यांचे वास्तव या परिसरात कोणत्या ना कोणत्या निमित्ताने झालेले दिसते. मोरोपंत पिंगळे असोत वा मस्तानी असो की पेशव्यांचा समशेर यांचे नाशिकशी ऋणानुबंध कोणत्या ना कोणत्या निमित्ताने जुळले आहेत. त्यांच्या पाऊलखुणा आजही त्यांचे अस्तित्व गावागावांमध्ये दाखवितात. त्याप्रमाणे महादजी शिंदे, मल्हारराव बर्वे, अहिल्याबाई होळकर, राजेबहाद्दर नारोशंकर यांनसह अनेक सरदार, घराणी व संस्थानांचा ठसा परिसरातील गावांवर उमटलेला दिसतो. सिन्नरमधील देवपूर अन् राणेखानाच्या इतिहासाला पानिपतच्या लढाईचा संदर्भ आहे. पानिपतच्या युद्धातून जखमी अवस्थेतेतील महादजी शिंदेंना राणेखानाने वाचविले व पुन्हा आपल्या मुलखात आणलं.
राणेखानाच्या निष्ठेवर खूश होत त्याला इमान म्हणून सिन्नर तालुक्यातल्या देवपूर, पिंपळवाडी, निमगांव, पास्ते ही गावे जहागिरी मिळाली. राणेखानाने देवनदीच्या किनारी प्रशस्त वाडा बांधला अन् येथेच विसावलाही. देवपूरमधील राणेखानाचा वाडा पाहताना त्यांच्या पराक्रमाची कल्पना येते. महादजी शिंदे राणेखानाला ‘भाई’ म्हणायचे अन् राणेखान गेल्यावर महादजी अनेक वेळा ‘भाई भाई’ म्हणून हाका मारायचे या संदर्भावरून राणेखानाचे व्यक्तित्त्व उलगडते. पण राणेखानाला हिरेखान नावाचा भाऊ असेल व देवपूरला राणेखान स्थिरस्थावर होत असताना त्याने आपल्या भावाला याच देवनदीच्या किनारी सिन्नरमधील सोनांबे या गावात वसवले असेल. हा इतिहास मात्र मौखिक रूपानेच सोनांबेकरांकडून ऐकायला मिळतो अन् त्या गावातील हिरेखानाच्या वाड्यासारख्या महालाच्या भिंती या इतिहासाचा साक्षीदार असल्याचे पहायला मिळतात. हिरेखान राणेखानासारखाच उमदा लढवय्या असणार, असा भास वाड्याच्या भिंतीला हात लावल्यावर होतो. दोघेही याच देवनदीच्या किनारी इतिहासाप्रमाणेच विसावले हेही दोघांमधील एक साम्य सोनांबे पुढे आणते.
सिन्नरहून सिन्नर-घोटी मार्गावर सात-आठ किलोमीटरवर डाव्या हाताला सोनांबे फाटा लागतो. फाट्यावरून दोन किलोमीटर रस्त्याने आत गेल्यावर झाडांच्या पुंजक्यामध्ये सोनांबे देवनदीच्या किनारी वसले आहे. गावात प्रवेश करताना लहान मोठी मंदिरे, समाधी दर्शन देतात. सकाळी सकाळी पारावर जमलेले ज्येष्ठ मंडळींचा पांढऱ्या शुभ्र पेहराव व कोन काढीत पुढे डोकावणाऱ्या त्यांच्या डोक्यावरील पांढऱ्या गांधी टोप्या इतिहासाबद्दल बोलू लागतात. सोनांबे म्हणजे काय? या माझ्या प्रश्नांनं सर्वच अस्वस्त होतात अन् एक आठवणींचा उसासा टाकत हरविलेल्या गोष्टींना उजाळा देताना जी निराशा, आपलेपणातून निर्माण झालेली उत्सुकता त्यांच्या डोळ्यात उभी राहते. ‘काय दिवस होते’ ही त्या वैशिष्ट्यांची आताची किंमत त्यांना आठवणींचे भावविश्व उलगडताना पाहून अंगावर काटा येतो अन् ते पिवळे धमक आंबे आजही चाखता आले असते तर काय मजा आली असती, असं उगाच वाटून जातं. आंब्याचा सिझनातही आता सोनांबेत आंबा मिळत नाही, ही ज्येष्ठांमधील रूखरूख सर्वकाही सांगते. सोनांबे म्हणजे सोन्यासारख्या पिवळा धमक आंबा पूर्वी गावात पिकायचा. चार माणसांच्या घेराइतकी मोठाली आंब्याची झाडे गावात होती अन् त्यांना येणारे आंबे सोन्यासारखे झाडावर दिसायचे म्हणून गावाला सोनांबे असे नाव पडले, असेही सोनांबेकर सांगतात.
सोनांबेच्या नावाप्रमाणेच सोनांबेचा इतिहासही आहे. मात्र तो आता हरविलेल्या अवस्थेत आहे. औरंगजेबाने नाशिक परिसरातील किल्ले घेण्यासाठी पाठविलेल्या एक सरदार सोनांबेतील भैरवनाथाचे मंदिर पाडण्यासाठी गावात आला होता. त्यावेळी त्या सुलतान नावाच्या सरदाराच्या भावाला सोनांबेत साप चावला. त्यावेळी ग्रामस्थांनी त्याला तीन दिवस भैरवनाथ मंदिरात बसवून ठेवले व त्याला झालेली विषबाधा दूर झाली. त्या सुलतानाने मंदिराला हात तर लावलाच नाही उलट मंदिराच्या जीर्णोद्धाराला मदत केली. तेव्हापासून गावातील भैरवनाथाच्या यात्रेत मंदिरासमोर मंडप टाकण्याचा मान गावातील मुस्लिम कुटुंबियांना आहे, असे हरिषचंद्र सातपुते, एकनाथ पवार, राजू आंबेकर व ज्ञानेश्वर बोडके सांगतात. भैरवनाथ मंदिरात साप चावलेल्या व्यक्तीला तीन दिवस बसवून ठेवल्यास विषबाधा होत नाही, अशी एक समजूतही ग्रामस्थांमध्ये आहे. गावात देवपूरच्या राणेखानाच्या भावाची म्हणजेच हिरेखानाची मोठी तीन मजली हवेली देवनदीच्या किनारी आहे.
हवेलीला काही वर्षांपूर्वी लागलेल्या आगीत ती पूर्णपणे जळून खाक झाली. मात्र आजही हवेलीच्या तीन दिशांच्या बलाढ्या भिंती तग धरून उभ्या आहेत. या तीन मजली हवेलीचा दरवाजा अन् आतील लाकडी कोरीव काम अप्रतिम होते, असे तेथेच राहत असलेले हिरेखानाची वंशज पीरमहम्मद गुलाब पठाण व शाकिद पठाण सांगतात. मात्र आगीत सर्वकाही गेलं. हवेलीतील भुयार थेट देवपूरच्या राणेखानाच्या वाड्यात जाते, असेही ते सांगतात. मात्र आता तेथे कोणाला जावू दिले जात नाही. बिबी नावाची हिरेखानाची बहिण सोनांबेशेजारच्याच वडगाव सिन्नर या गावात दिली होती. बहिणीचे लग्न करताना हिरेखानाने भेट म्हणून सालखडी नदी दिली होती. त्यामुळे वडगाव सिन्नरची मंडळी हक्काने सालखडी नदीचे पाणी पाटाने गावात नेतात, असेही ग्रामस्थ सांगतात. हिरेखानाबद्दल इतिहास फार काही सांगत नसला तरी हवेली वजा वाडा त्याची शैली खूप काही सांगून जाते.
सोनांबेतील वतनदारीतील हेरफेरीचा एक संदर्भही इतिहासाच्या पानांमधून उलगडताना दिसतो. १७९६ मधील कारवाईचा एक मोडी कागद उपलब्ध झाला आहे. यानुसार, सिन्नर परगण्यातील मौजे सोनांबे या गावच्या दादो रघुनाथ कुळकर्णी याने मौजे बेलगाव तऱ्हाळे येथील कुळकण्यांचे वतन नसत्या भानगडी करून त्याच्यापासून निम्मे कुळकर्णीपण लिहून घेतले व जबरदत्तीने बेळगांव तऱ्हेळेच्या कुळकर्ण्यांचे घर मोडून टाकत तेथे वाडा बांधला होता. या संबंधिची फिर्याद दौलतराव शिंदे यांच्याकडे गेली होती. या फिर्यादीची दखल घेऊन मल्हारराव भिकाजी गोसावी यास पत्र लिहून याबाबात दादो रघुनाथ कुळकर्णीचा बदअमल मोडून काढण्याची आज्ञा दौलतराव शिंदे यांनी केली. त्यांनी त्या पत्रात म्हटले आहे की, सोनांबे या गावातील कुळकर्ण्यांचे घर मोडून सोनांब्याच्या कुळकर्णीने जो वाडा तऱ्हाळेत बांधलेला आहे तो तोडून त्या जागेवरील असेल ती संपत्ती, वतनाचे कागदपत्र ताब्यात घेऊन त्यांना लष्करात येण्यास सांगावे. यासाठी सर्व व्यवस्था भिकाजी गोसावी यांनी पहावी तसेच या विषयीचा फिरून बोभाटा येऊ न देण्याची ताकीदही या हुकूमनाम्यात दिली आहे. याचे मूळ पत्र व हा संदर्भ एक अज्ञात व्यक्तींने नोंदविला आहे. हिरेखानाच्या वाड्याकडून भैरवनाथाच्या मंदिराकडे जाताना गावातील ब्रिटीशकालीन शाळा पहायला मिळते. ही शाळा लवकरच नवे रूपडे घेणार आहे. उजव्या हाताला एक मंदिर व त्यासमोर एक पेशवेकालीन विहीर आहे. येथे पाण्यासाठी महिलांची गर्दी पहायला मिळते.
सोनांबे गावचे मुख्य दैवत म्हणजे भैरवनाथ महाराज. भैरवनाथांचे मूळ गाभारा मंदिर दगडी बांधणीचे आहे. या मंदिरात छोटे दगडी देवघर आहे ते मूळ भैरवनाथ मंदिर म्हटले जाते. मंदिरावर द्वारपाल, माथ्यावर उभा गणपतीची मूर्ती, कळसाला वेढा घातलेला नाग अन् गणपती मूर्तीच्या दोन्ही बाजूने वाघांच्या प्रतिमा छोट्याखानी मंदिराला साज चढवितात. या दगडी मंदिराभवती मोठे मंदिर बांधले आहे. त्यावर कौले बसविण्यात आली आहेत. मंदिराच्या कामासाठी भगूर व घोटीकरांनी मदत केल्याचा उल्लेख मंदिराच्या प्रवेशद्वारावर आहे. मंदिरात लोखंडी दोन नगारे आहेत. मंदिराचा समोरचा मंडप सिमेंटचा बांधलेला आहे. मंदिरासमोरील दीपमाळ खूपच सुंदर असून, दीपमाळेवर पायांपाशी उठावदार नागाची प्रतिमा कोरलेली आहे. मंडपात अनेक समाधी आहेत. भैरवनाथाच्या यात्रेची सुरूवात पहिल्यादिवशी पालखी, रथ परंपरेने होते. संध्याकाळी काठ्या मिरविल्या जातात.
दुसऱ्या दिवशी कुस्त्या संध्याकाळी बारागाड्या ओढण्याचा कार्यक्रम होतो. बोहाडा ही परंपरा १५ वर्षांपासून बंद आहे. मात्र सोंगाचे मुखवटे दैवत म्हणून अनेकांनी जपले आहेत. गावात बाबुराव बाबा पवार यांची समाधीही आहे. त्यांचे वंशज बबन बाबुराव पवार यांच्याकडे बारागाड्या ओढण्याचा मान आहे. भैरवनाथ मंदिरामागे नागोबा काळेंची समाधी आहे. छत्रपती शिवाजी महाराज विश्रामगडावर असताना त्यांच्या सुरक्षेची जबाबदारी नागोबा काळे यांच्याकडे होती. त्यांच्याकडे घोडा असल्याने त्यांना घोडे आडनाव पडल्याचे ग्रामस्थ सांगतात. त्यांना छत्रपतींनी सोनांबे गावात जमीन जहागिरी म्हणून जमीन दिली होती. घोड्यावरून पडून त्यांचा मृत्यू झाला. खापराळे गावातील डोंगरावरील भवानी देवीलाही ग्रामस्थ मानतात. गावातील काळे-घोडे मंडळी देवीची पूजा करतात. गावात काशीआई, हनुमान मंदिर, राम मंदिर, महादेव मंदिरासह इतरही अनेक लहान मोठी मंदिरे आहेत. नाशिकरोडच्या अनुराधा थिएटरचे रामनाथ कलंत्री व इतर कलंत्री मंडळी या गावची.
भैरवनाथ मंदिराच्या डाव्या हाताला देवनदी व त्यावर ब्रिटीशकालीन बंधारा पहायला मिळतो. गावातून बाहेर पडताना हनुमान मंदिरातील वीरगळ अन् मंदिरामागील अहिल्याबाईंची बारव पहायला विसरू नका. आता आतापर्यंत बारवेचे पाणी ग्रामस्थ वापरत होते. मात्र त्यात खूप कचरा साचल्याने ती मृत अवस्थेत आहे. ही बारव स्वच्छ करून जपण्याची गरज आहे. बारवे शेजारीच गोसावींच्या समाधी आहेत. सिन्नर तालुक्यात गोसावी समाज सर्वच गावांमध्ये पहायला मिळतो. गोसावी समाज हा भटक्या जातीत मोडतो; मात्र आता हा समाज गावांमध्ये स्थिरावला आहे. गिरी, पुरी, गोसावी, गोस्वामी, भारती अशी आडनावे त्यांच्याच आढळतात. या समाजाला शंकराचे वरदान असल्याचे म्हटले जाते. सिन्नरमध्ये महाशिवरात्रीला हा समाज एकत्र येत शंकराची पूजा करतो. अनेक गावांमध्ये आजही गोसावी समाजातील प्रथा, परंपरा आजही भक्तीभावाने पाळल्या जातात. यात अगदी घरोघरी जोगवा मागण्याची पद्धत असो वा अंतविधीची प्रक्रिया असो. गोसावी समाजातर्फे सिन्नर परिसरातील काही गावांमध्ये मठाची स्थापनाही केलेली दिसते. यात सोनांबेचा समावेश होतो. गावात गोसावी व भारती आडनावाची मंडळीही आहेत.
सोनांबेतून बाहेर पडताना नजर उगाचच सैरभैर होते. अजूनही कोठे आंब्याचे मोठे झाड दिसतील, त्याला लगडलले पिवळे धमक आंबे पहायला अन् चाखायला मिळेल, असे वाटते. मात्र सोन्यासारखा हा क्षण अनुभवलेल्या ज्येष्ठ मंडळींच्या डोळ्यातील आठवणींमध्ये जे सोनांबे पाहिले ते आज अनुभवायला मिळत नाही. सोनांबे अनेक बाबतीत प्रगतीपथावर आहे. मात्र गावात येणाऱ्या पाहुण्यांना सोन्यांचे आंबे अन् जपून ठेवलेला इतिहास अनुभवायला मिळाला तर अजून काय हवं.. नाही का?














































































































































































































































No comments:
Post a Comment