Monday, June 23, 2025

बारव ( अंतिम )

जल हे जीवन आहे, पृथ्वी, जल, अग्नि, आणि हवा आदि पंच तत्वांमध्ये मूलतत्व जल हे आहे. जलाशिवाय जीवन, याची कल्पनाही नाही. आदिमानव जगलांमध्ये शिकार करून भटकंती करीत आपली उपजीवीका भागवत असतानाच शेतीचा शोध लागला. त्यामुळे मानव स्थायिक झाला व नागरी संस्कृती निर्माण आली. मानव प्रामुख्याने नदिच्या किनारी स्थायिक झाला. जिवंत राहण्यासाठी पाण्याची नितांत गरज आहे. त्यामुळे नदिकिनारी किंवा ज्या ठिकाणी पाण्याची मुबलक सोय आहे, त्याच ठिकाणी मानवाने वस्ती केली. हळूहळू मानव विकसित होत गेला व गावेच्या गावे वसायला लागली.
मानवाने उत्क्रांतीच्या विकासाच्या क्रमात पाण्याच्या गरजेची पूर्तता करण्यासाठी नद्यांची आणि नैसर्गिक पाण्याच्या स्त्रोताच्या किनार्यावर वस्ती केली. मात्र जेव्हा मानवाने वस्ती मोठ्या प्रमाणात वसवून गाव आणि शहर वसवायला सुरवात झाली तेव्हा रहिवाश्यांना पाण्याची सहज उपलब्धता व्हावी या दृष्टीने  विहीर, तालाब इत्यादीची निर्मिती सुरू झाली. तसेच व्यापारी मार्गांवर पाण्याची व्यवस्था विहीर आणि तलाव स्वरुपात केली गेली. भू-गर्भातील पाण्याची उपलब्धता मनुष्याने जाणून घेणे आवश्यक आहे  आणि मानव निर्मित जल उदगम विकसित केले गेले.
  पिण्याच्या पाण्याच्या उपलब्धता व्हावी यासाठी प्राचीन काळापासून मानवाने विहीरी, बावड्या आणि तलावांची निर्मिती केली. प्राचीन काळातील नगरांचे पुरातत्व खात्याने उत्खनन केल्यावर विहीरी दिसतात. हडप्पाकालीन नगरामध्ये आणि व्यापारी केंद्रात बांधीव विहीरी सापडल्या. अश्या विहीरी मोहंजोदडो, हडप्पा, लोथल अश्या ठिकाणी बघायला मिळते. तसेच छत्तीसगडमधील सिरपुरमध्ये प्राचीन काळातील विहीरी सापडतात. 
   प्राचिन वास्तूशास्त्र विषयक ग्रंथात भू-परिक्षा विषयक तपशील मिळतात. माणसार वास्तूशास्त्र विषयक ग्रंथात भू-परिक्षा विधान याविषयी चर्चा आली आहे. याविषयीचे काही सूत्र परंपरेने केलेल्या सूक्ष्म निरिक्षण व अवलोकनानंतर दिली गेली. कुठलाही जलाशय निर्माण करण्यापूर्वी पारंपारिक शहाणपण व त्यातून सिध्द झालेली काही सूत्रे यांचा उपयोग होत होता.

   मानवी वसाहतीसाठी पाणी हे अतिशय महत्वपूर्ण घटक आहे. सिंधू संस्कृती ही नदीकाठी विकसित झाली होती. सिंधू संस्कृतीतील उत्खननांमध्ये अनेक विहीरींचे अवशेष सापडलेले अहेत. प्रत्येक गावात तीन-चार घरांमध्ये एक विहीर असल्याचे दिसून येते. नंतरच्या काळात स्थापन झालेली मोठी मानवी वसाहत ही महाजनपद काळात दिसून येते. या काळात वस्ती मोठ्या प्रमाणात नद्यांच्या काठावर दिसून येते.  
     प्राचिन वास्तूशास्त्र विषयक ग्रंथात भू-परिक्षा विषयक तपशील मिळतात. माणसार वास्तूशास्त्र विषयक ग्रंथात भू-परिक्षा विधान याविषयी चर्चा आली आहे. याविषयीचे काही सूत्र परंपरेने केलेल्या सूक्ष्म निरिक्षण व अवलोकनानंतर दिली गेली. कुठलाही जलाशय निर्माण करण्यापूर्वी पारंपारिक शहाणपण व त्यातून सिध्द झालेली काही सूत्रे यांचा उपयोग होत होता. आजही अंगी असलेल्या काही दैवी शक्ती आधारे परिसराची पहाणी करून विहीरींची जागा दाखवणार्‍या व्यक्ती मिळतात. अशा व्यक्तींना पायाळू असे संबोधतात.
      त्या त्या विशिष्ट प्रदेशातील भूस्थर रचना यांचा अचूक अंदाज घेवूनच प्राचिन शास्त्रग्रंथातून भूमी परिक्षा करण्यासाठी उपलब्ध क्षेत्र त्या परिसरातील वृक्ष जमिनीचा स्पर्श, गंध, रंग व नाद यांचा आधार घेतला जाई. परिसरातील खडकाची घडण, मातीचा पोत, स्थानावरील वनस्पती व प्राणीजन्य खुणा यांचा अभ्यास करण्यात येई व अनेक वर्षांच्या अनुभवानंतर काही सूत्र सिध्द करण्यात आलेली होती. उदा. जर जांभळाच्या पूर्वेस जवळ वारूळ असेल तर त्याच्या दक्षिणेस दोन पुरूष खोलीवर गोड पाणी लागते. ज्या वृक्षाच्या फळास किंवा पुष्पास विकार (फळ किंवा पुष्प सदृष्य) असेल त्या वृक्षाच्या पूर्वेस तीन हात पुढे चार पुरूष खणले असता पाणी लागते. त्याची खूण म्हणजे खाली दगड व पीतवर्ण (पिवळ्या रंगाची जमीन) असेल.
     वड, पळस, उंबर हे एकत्र असतील, तेथे खाली उदक आहे. वड व पिंपळ हे एकत्र असतात, तेथेही वृक्षांच्या उत्तरेकडे चार हात खणले तर पाणी लागेल.
    ज्या भूमीवर मुंज, काश कुश यापैकी एका प्रकारचे गवत उपलब्ध आहे व जमीन निळसर, खडकाळ आहे, किमान काळी अथवा तांबड्या (लाल) रंगाची असेल, तेथे विपुल गोड पाणी असते. अग्निपुराण तसेच कृषिपराशर व अन्य स्मृती ग्रंथात याविषयीच्या नोंदी आहेत.

      विठ्ठलाजी शास्त्री धारूरकर यांनी उपयुक्त धर्मशास्त्र संग्रह या ग्रंथात (मुंबई शके १८२६) याविषयी चर्चा केली आहे. तर च.धु. देशपांडे यांनी महाराष्ट्राचा भूगोल (दिल्ली १९७६) यामध्ये महाराष्ट्राच्या भूस्तर रचनेची व डेक्कन ट्रॅप किंवा बेसाल्ट या अग्निजन्य खडकाची वैशिष्ट्ये स्पष्ट केली आहेत. यातून भूपृष्ठ व भूजल यांच्या वापराविषयी नोंद केली आहे. अग्निजन्य खडकाची सच्छिद्रता १ ते ३ टक्क्यांपेक्षा जास्त नाही. ग्रॅनाईट किंवा बेसाल्टमधून पाणी झिरपणे कठीण असते. चिकण मातीच्या थरातून सहसा पाणी जिरत नाही. उलट, वालूका स्थर किंवा लाईमस्टोन (चुनखडी) खडकातून पाणी मिळते. जमिनीखाली काही विशिष्ट खोलीवर सर्व प्रकारच्या सछिद्र भेगांनी युक्त खडक असतात. ते भूजलाने ओतप्रोत असतात. या अंतरभौम जलपातळीत भूजल पृष्ठ म्हणतात. देशपांडे नोंदवतात महाराष्ट्रातील विहीरींचे प्राकृतिक स्वरूप केवळ भूपृष्ठ रचनेमुळे निश्‍चित झाले नसून भूमीगत पाण्याचाही बराच प्रभाव आहे. राज्याच्या जलसिंचनाच्या एकूण गरजेपैकी ५० टक्के गरज विहीरी भागवतात. असे असूनही आतातपर्यंत भूमिगत जलपातळीबाबत राज्यात नगण्य संशोधन व्हावे ही आश्‍चर्यकारक वस्तूस्थिती आहे. आज या क्षेत्रात जाणीपूर्वक लक्ष दिले जात आहे. नवीन तंत्रज्ञानाआधारे भूजलाचा शोध घेणे शक्य झाले आहे.
     जमीनीचे विवीध स्तर

  शिवाय वैज्ञानिक दृष्टीकोनातून एखाद्या भूभागाची पाहाणी करून पुनर्भरणाचा विचारही केला जावू शकतो. तथापि मध्ययुग व त्याहीआधी जो भाग सदैव भूजलाने ओतप्रोत भरलेला होता त्याचा अचूक शोध घेण्यात आला. यासाठी परंपरेने व सातत्याने केलेल्या परिसराच्या निरीक्षणाचा फायदा त्यांना झाला. पारंपारिक, अनुभवजन्य शहाणपण अशी याची नोंद केली जावू शकते. भारताच्या विविध भागाचे भूस्थर रचना समजावून घेतांना त्या त्या क्षेत्रात असलेले नैसर्गिक वैशिष्ट्ये लक्षात घेतली गेली, शिवाय सिंधू, सरस्वती नदीचे खोरे, ब्रम्हपुत्रा, गंगा, नर्मदा, गोदावरी, कावेरी या व अशा प्रत्येक नदीखोर्‍याची स्वत: ची अशी वैशिष्ट्ये होती. महाकाव्यातून व पौराणिक ग्रंथातून त्यांची नोंद केली आहे. अशी नोंद करतांना स्थल महात्म्य, लोकस्मृती, परंपरा यांचाही विचार केला गेला. व त्या त्या क्षेत्रांचे वैशिष्ट्य लक्षात घेवून जागा नागरिकांसाठी किंवा मानवी वसाहतीसाठी उपयुक्त असणार्‍या भूमीअंतर्गत जलस्त्रोतांचा शोध घेण्यात आला, यानंतर त्या क्षेत्रात निर्माण करण्यात आलेल्या वास्तूंची प्रदेशनिहाय अशी वेगळी वैशिष्ट्ये पहावयाला मिळतात. बर्‍याचदा मंदीर स्थापत्यामध्ये जसे वैविध्य आढळते, तसेच वैविध्य जलव्यवस्थापनाच्या क्षेत्रात जाणवते.
      दक्षिणेतील द्रवीड स्थापत्य शैली, उत्तरेतील नागरशैली किंवा गोदावरी खोर्‍यात आढळणारे भूमीज व वेसर (खेचर) स्थापत्यांचा प्रभाव आपणाला त्या त्या क्षेत्रातील बारव स्थापत्यावर पडल्याचे आढळते. याशिवाय भौगोलिक वैशिष्ट्यांचा परिणाम म्हणून निर्माण होणारी लयन स्थापत्य (गुहाशिल्प) दुर्ग स्थापत्य व मंदीर स्थापत्य या प्रत्येक वास्तूंच्या मधला वेगळेपणा त्या परिसरातील जलव्यवस्थापन मध्येही आढळतो. रामायणासारख्या ग्रंथात दैवमातृक आणि नदीमातृक शेतींचा उल्लेख येतो. पावसाच्या पाण्यावर भिजणारी जमीन ही देवमातृक मानली गेली. तथापि यापेक्षा वेगळ्या पध्दतीने मानवाने शेती करून पिक पध्दती विसकित केली. त्यासाठी नदी, विहीरी, जलाशय, कालवे यासारख्या पाणी व्यवस्थापन पध्दतीचा आधार घेतला. त्याला अदेवमातृक किंवा नदीमातृकम्हटले गेले आहे.
       तुलसीदास कृत रामायणात रावणाच्या वाटीकेचे वर्णन आले आहे त्यात वन, बाग, उपवन, कुप्, वापी यांचा उल्लेख आहे. स्नानासाठी सरोवर, पिण्याच्या पाण्यासाठी कुप, शेती आणि पशुंसाठी बावडी यांची निर्मिती केली जात असे. प्रजेच्या सुखसोयीसाठी उत्तम जलव्यवस्था असणे आवश्यक होते.सातव्या शतकातील प्रसिध्द संस्कृत कवी बाण आपल्या कांदबरी या काव्यसंग्रहात पोखर, सरोवर यांच्या निर्मितीला सर्वाधीक महत्व देतो. जलस्त्रोताचे उल्लेख ऋग्वेदात देखील आहेत. गुह्यसुत्र या ग्रंथानुसार कोणत्याही जातीचा पुरुष किंवा स्त्री तलाव खोदून घेउ शकते. आज सुध्दा पाण्याची व्यवस्था करणे हे पुण्याचे काम समजले जाते. लोकांनी विहीरी, तलाव बांधावे यासाठी शास्त्रांमध्ये प्रोत्साहन दिलेले आहे. जी धनवान व्यक्ती तलावाचे निर्माण करेल तर एखादी दरिद्री व्यक्ती एखाद्या विहीरीचे जरी निर्माण केले तरी दोघांना मिळणारे पुण्य सारखेच असेल. जे कोणी बावडीची निर्मिती करेल त्याची भगवान विष्णूच्या बरोबरीने पुजा केली जाते. 
महाभारतातील भीष्म पर्वात वेदव्यासांनी तलावाचे वर्गीकरण त्यामध्ये किती काळ पाणी साठलेले राहु शकते यावर केले आहे. अश्या प्रकारे बांधलेल्या तलावामुळे जे पुण्य मिळते त्याचे वर्णन व्यासांनी केले आहे. हिंदु संस्कृतीनुसार या प्रकारचे जलस्त्रोत निर्माण करणे हे धार्मिक कृत्य मानले जाते आणि आपली कीर्ति कायम राखण्याचा हा प्रभावी मार्ग आहे.
कवी केशवदासने कवीप्रिया या काव्यसंग्रहात नगराचे वर्णन करताना लिहीलेले आहे.
खाई कोट अट ध्वजा, वापी कूप तड़ाग, वार नारी असती सती, वरनहु नगर सभाग। पदमावत में जिक्र है कि वारी सुफ़ल आहि, तुम बालापन में ही फ़ल गई, मध्यकाल में वाटिका लगाने के बाद उसका विवाह किया जाता था। तब तक लगाने वाला उसका फ़ल न खाता था। वाटिका लगाने एवं फ़लने के बाद वापी कूप तड़ाग का विवाह करने के बाद ही स्वामी उनका उपभोग करता था। व्यंग्य करते हुए कहा है कि - तुम्हारी वाटिका तो कुंवारी ही फ़ल गई।
 अर्थात विहीरीची निर्मिती करणे हे तितके सोपे नाही. भुगर्भातून पाणी काढण्यासाठी जोपर्यंत भुजल पातळीपर्यंत पोहचत नाहीत, तोपर्यंत खणत जावे लागते. शिल्पशात्रात कुप नेमेके कोठे खणायचे याचा ही विचार केला आहे. त्यानुसार एखाद्या गावाच्या नैऋत्य दिशेला विहीर खणली तर व्याधी किंवा पीडा उत्पन्न होईल, वरुण दिशेला खणली तर पशुधनात वृध्दी होईल, वायव्य दिशेला खोदले तर शत्रुनाश, उत्तर दिशेला खोदले तर सुख मिळेल, ईशान्य दिशेला खोदले तर शत्रुचा नाश होतो, वराहमिहीर नुसार जर गावाच्या आग्नेय कोपर्यात विहीर खोदली तर ती सदोदीत भिती उत्पन्न करेल तसेच मनुष्याचा नाश होइल, नैऋत्य कोपर्यात विहीर खोदली तर धनहानी होते, वायव्य कोपर्यात विहीर खणली तर स्त्री हानी होते. अर्थात या तीन दिशा सोडून इतर दिशांना विहीर खणायला हरकत नाही.

जलस्त्रोताची निर्मिती करण्यापुर्वी भुजल नेमके कोठे आहे, याची स्थाननिश्चीती करुन समस्त देवतांना आवाहन करुन पुजा केल्यावर कुप नेमका कोठे खोदायचा याचे ठिकाण ठरवले जाई. सुमुहुर्त काढून कुपाची निर्मिती सुरु केली जायची. भुमीचा आधार घेउन विहीरीचे निर्माण करण्यापुर्वी विवीध विधी केले जात असे. जिथे जमीन भक्कम असेल तिथे खोल विहीर खणून वीटांचा वापर करुन पक्के बांधकाम केले जाई. मात्र जिथे खोदकाम करतना रेती सापडेल तिथे चिरेबंदी केल्यावर हळूहळू वाळू काढून टाकली जाई. याला कोठी गलाना असे म्हणतात. अर्थात बरेच उत्खनन केल्यावर मग विहीरीमधून पाणी साठवले जाते, त्यामुळे हि प्रक्रीया धोकादायक मानली जाती. नारद पुराणात कुपाची निर्मिती करण्यासाठी प्रोत्साहन देण्यासाठी एक श्लोक आहे, 
एकाहं तु स्थितं पृथिव्यां राजसन्तम। कुलानि तारयेत् तस्य सप्त-सप्त पराण्यपि।।६५।। 
    याचा अर्थ ज्याची खोदकाम झाल्यावर केवळ एक दिवस जरी जल स्थिर राहीली तरी ते पाणी सात कुळांना पुरेल इतके असते. 
दीपालोक प्रदानेन वपुष्मान् स भवेन्नरः। प्रेक्षणीय प्रदानेन स्मृतिं मेधां च विंदति।।६६।।
   याचा अर्थ दीपदान केल्यामुळे मनुष्याचे शरीर उत्तम होते तर जलदान केल्यामुळे त्याची स्मरणशक्ती आणि बुध्दीत वृध्दी होते. असे बृहस्पति स्मृतित सांगितले आहे.
शास्त्रामध्ये राजांना स्पष्ट आज्ञा दिली आहे कि कोणी पाण्याचे प्रदुषण केले किंवा पाण्याचा स्त्रोत बंद केला तर त्याला शिक्षा द्यावी.
पूर्णे कूप वापीनां वृक्षच्छेदन पातने। विक्रीणीत गजं चाश्वं गोवधं तस्य निर्द्दिशेत्।।
   याचा अर्थ जी व्यक्ती विहीर किंवा बाव बुजवून टाकतो, झाड कापून पाडतो, जी व्यक्ती हत्ती किंवा घोड्याला विकतो त्याला गोवध केला असे मानून तशी शिक्षा द्यावी.
‘तडाग देवतागार भेदकान् घातयेन्नृपः।।
  अग्नीपुराणात राजासाठी स्पष्ट आज्ञा दिली आहे कि जर एखाद्या व्यक्तीने जलाशय किंवा देवाचे मंदीर नष्ट केले तर त्याला मृत्युदंड दिला जावा.
स्कंद पुराणातील माहेश्वर खंडात लिहीले आहे कि जी व्यक्ती कुप विकतो, पाण्यात मैथुन करतो, तलाव, विहीरी नष्ट करतो, तो पातकी आहे. जर अश्या व्यक्तीला पुर्नजन्म मिळाला तरी त्याचा त्रास होइल.
जल हे संपुर्ण मानव जातीसाठी महत्वाचा घटक असल्यामुळे प्राचीन काळापासून पाण्याचे महत्व मानवाने समजून घेतले आणि पाण्याची नीट व्यवस्था केली तसेच जलस्त्रोत निर्मितीवर भर दिला. उत्तर भारतात तर जलस्त्रोताच्या पुजेची प्रथा आहे. मुलाचा जन्म झाला तर स्त्रीया कुपाची समारंभपुर्वक पुजा करतात. हि प्रथा कदाचित जलस्त्रोताप्रति कृतज्ञता दर्शवण्यासाठी पडली असेल.
कुप हा असा जलस्त्रोत आहे ज्याचा व्यास ७ ते ७५ फुट असु शकतो आणि ज्यातून दोरीचा उपयोग करुन पाणी काढता येते.
वापीची लांबी ७५ ते १५० फुट असू शकते आणि ज्यामध्ये उतरुन पाणी काढता येईल इतकीच पाण्याची पातळी असते.
पुषकरणी  १५० ते ३०० फुट आकाराची असु शकते. तर तलावाचा आकार ३०० ते ४५० फुट असु शकतो.
बारव हे नाव लांबी मोजण्याच्या ‘बाव’ या मापावरून आले असावे. बारा बाव लांब असलेल्या वास्तुला बारव असे संबोधले गेले असावे. 
बारव  म्हणजेच पायर्‍या असलेली विहिर. केवळ बारव या नावाने आपण याला ओळखत असलो तरी याचे भरपूर प्रकार आहेत. पायर्‍यांची विहीर या बोली भाषेतील शब्दांत बारवेची नेमकी व्याख्या आलेली आहे. इतर विहिरीतून पाणी उपसण्यासाठी पोहर्‍याचा वापर करावा लागतो. किंवा मुळात या वहिरीचा उद्देशच पाणी उपसून त्याचा शेतीसाठी किंवा पिण्यासाठी उपयोग करणे असा असतो.
पण  बारवेच्या बाबतीत मात्र पाणी मोटेने उपसणे हा हेतूच नाही. बारव ही त्या प्रदेशांतील जलव्यवस्थापनाचे केंद्र असते. बारवेच्या जवळपास उंचीवर एखादा तलाव, पाणीसाठा, नदी असते. त्या पाण्याचे जमिनीखालचे प्रवाह शोधून त्याच्या नेमक्या बिंदूवर बारव बांधली जाते. हीला पायर्‍या असल्याने त्याचा उद्देश पाणी प्रत्यक्ष घागरीने, म्हणजेच हाताने घेणे असा असतो.  बाष्पीभवन टाळण्यासाठी बरेच वेळा रूंदी कमी व लांबी जास्त, प्रत्येक बारवेस जवळच्या ओढा, नदी वा तलावाच्या पाण्याचा वापर करून बारव बारमाही पाणी देईल अशी पुनर्भरणाची सोय, प्रत्येक बारवेच्या आत देवकोष्ठ/देवतांच्या मूर्ती कदाचित पाण्याचे पावित्र्य जतन करण्याच्या उद्देशाने, बारवेतील पाणी देवाचे आहे, यामध्ये पाय धुवू नयेत, ते प्रदूषित करू नये हा त्या पाठीमागचा भाव असावा, बारवांचे आकार पण वेगवेगळे, फुलाच्या आकाराच्या बारवांना पुष्करणी, मोठ्या आकाराच्या बारवा गाव तलावाचं काम करीत, 
बारवा  जेंव्हा मंदिर परिसरांत बांधल्या जातात त्याला कुंड, तीर्थ, कल्लोळ अशी नावे असतात. कंकालेश्वर (बीड) येथील मंदिर तर एका सुंदर अशा बांधीव कुंडातच आहे. मादळमोळी (जि. बीड) येथील बारव ही चारही बाजूने सुंदर अशा बांधीव ओवर्‍या असलेली आहे. आता या बारवेतच देवीचे मंदिर बनविल्या गेले आहे. चारठाण येथील पुष्करणी बारवही चारही बाजूने ओवर्‍यांचे बांधकाम केलेली अशी विस्तीर्ण आहे. ज्या अतिशय विस्तीर्ण अशा बारवा आहेत त्यांना पुष्करणी  म्हणतात. अतिशय विस्तीर्ण असा तलाव कंधार येथे आहे त्याला ‘जगत्तुंग समुद्र’ असे नाव दिल्या गेले आहे.
   महाराष्ट्रात  हीनयान बौद्ध काळांत लयनस्थापत्यांत पाण्याच्या टाक्यांची निर्मिती झाल्याचे तज्ज्ञ मांडतात. त्यानंतर महाराष्ट्रात भव्य मंदिरांचे निर्माण होवू लागले तेंव्हाच पाणी साठवण्यासाठी व्यवस्थापनासाठी बारवांची निर्मिती मंदिर परिसरांत झालेली आढळते. मराठवाड्यांतील प्राचीन मंदिरांपैकी औंढा, निलंगा, जामखेड (ता.अंबड) येथे बांधलेल्या दगडी विहिरी आढळतात.
महाराष्ट्रात या काळातील मोठ्या वसाहतींचा विचार करता गोदावरी काठावर नाशिक, पैठण आणि बोधन; तेरणा काठी तेर; कुकडी काठी जुन्नर; केलना काठी भोकरदन; वैनगंगा काठावर पौनी; उल्हास नदीकाठी कल्याण या ठिकाणी सातवाहन कालिन वस्ती दिसून येते. पुढील काळात मानवी वस्ती इतर ठिकाणी स्थलांतरीत होण्यास सुरूवात झाली. वाढलेल्या मानवी वस्तीसाठी पाण्याची व्यवस्था करण्यासाठी नदीचे काठ अपुरे पडू लागल्यानंतर पर्यायी मार्गांचा शोध सुरू झाला. आणि यातूनच निर्मिती झाली भुगर्भातील पाण्याचा वापर करण्यासाठी विहीरी आणि बारव निर्मितीची. राष्ट्रकूट काळात महाराष्ट्राच्या विविध भागांत अशा बारवांची निर्मिती सुरू झाली. आणि पुढील चालुक्य, यादव आणि विजयनगर काळात मोठ्या प्रमाणात बारवांची निर्मिती करण्यात आली.
   महाराष्ट्राच्या जलव्यवस्थापनात असाधारण महत्त्व असलेल्या पायविहीर, बारव स्थापत्य यांचा अभ्यास फारसा झालेला नाही. एका विशिष्ट कालखंडामध्ये मंदिरांची उभारणी आपल्याकडे फार मोठ्या प्रमाणात झाली. सामान्यपणे यादवशैलीची (हेमाडपंती) म्हणून अशी मंदिरे ओळखली जातात. याच काळात बारव स्थापत्याची निर्मितीही मोठ्या प्रमाणत होत होती. डॉ. ए. व्ही. नाईक यांनी आपल्या प्रबंधात या विषयीची काहीशी नोंद घेतली आहे. असे असले तरी प्राचीन साहित्य आद्य मराठी वाङ्‌मय आणि रुढ मराठी बोली भाषेत जलाशयाला अनेक पर्यायी शब्द रुढ आहेत. अगदी प्रारंभिक काळात लयननिर्मितीबरोबरच "पाणीयपोढी" किंवा "पाणपोढी" म्हणजे पिण्याचे पाणी साठविण्याची टाकी आणि "न्हानकोढी" म्हणजे स्नानासाठी व अन्य उपयोगासाठी लागणाऱ्या पाण्याचा साठा करण्यासाठी विविध आकाराच्या टाक्या खोदण्यात आल्या. किल्ल्याची निर्मिती होत असताना सर्वप्रथम निश्चित जलस्त्रोताचा शोध घेऊन आवश्यक त्या ठिकाणी टाक्या व कूप तयार केल्याचे दिसतात. गोदावरी, कृष्णा, मांजरा, चंद्रभागा अशा नद्यांच्या परिसरात ज्याठिकाणी वसाहती निर्माण झाल्या तेथे प्रामुख्याने घाट बांधण्यात आले. निसर्गतः उपलब्ध नदीच्या काठाचा योग्य उपयोग करुन घेण्याच्या दृष्टीने अशा वैशिष्ट्यपूर्ण घाटांची निर्मिती सातवाहन काळापासून होत असावी. अन्य स्थानांवर नगरे वसवताना मात्र भूगर्भातील जलाशयाचा शोध घेऊन विविध प्रकारचे आड, विहिरी, बारव व पोखरणी यांची निर्मिती करण्यात आली. दक्षिण भारतामध्ये रामेश्वर सारख्या जंबू द्विपावर जाणीवपूर्वक अनेक तीर्थे व पुष्करणी यांची निर्मिती झाली. केवळ रामेश्वर मंदिरामध्ये २२ वावी खोदण्यात आल्या. महाराष्ट्रामध्ये लोणार (जिल्हा बुलढाणा) येथे उल्कापातातून निर्माण झालेल्या विवराच्या परिसरात अनेक बारवांची निर्मिती करण्यात आली. विविध राजवटीतील प्रमुख स्थाने व तीर्थक्षेत्रे उदा. त्र्यंबकेश्वर, परळी-वैजनाथ, औंढा-नागनाथ, माहूर, तुळजापूर, कोल्हापूर अशा ठिकाणी अनेक कुंड, कल्लोळ यांची निर्मिती झाली. या स्थानांवरील जनसमुहाची पाण्याची गरज भागविण्याच्या दृष्टीने अशा वास्तूंची निर्मिती होत असतानाच पुण्यप्राप्तीविषयक संकल्पनाही जनमानसात रुजविली गेली. यातून लोणार, चारठाणा, ईडोळी, सिंदखेडराजा, पिंगळी इ. ठिकाणी प्रशस्त बारवांची निर्मिती झाली. एका मोठ्या बारवेच्या बांधकामासाठी घ्यावे लागणारे परिश्रम हे एका मंदिर संकुलाची उभारणी करता येईल एवढे असत.मंदिर व त्याच्या आसपासच्या परिसरात भेट दिल्याने पापक्षालन होते अशी भावना यामुळे या स्थळांना तीर्थक्षेत्राचे महत्व आले. त्यामुळेच अशा ठिकाणी यात्रा भरवण्याची प्रथा सुरु झाली आणि त्यातूनच अशा स्थळी स्नानकुंड व बारव बांधण्याचा प्रघात सुरु झाला असावा. अशा प्रकारच्या पायाविहीर किंवा बारव बांधण्याची कला प्राचीन महाराष्ट्रातील स्थपतींना अज्ञात नव्हती.
    लेण्यांच्या आसपास आणि किल्ल्यांवर जलव्यवस्थपनासाठी दगडी टाके देखिल खूप ठिकाणी दिसून येतात. खडकाला फोडून आतमध्ये पोकळ जागा तयार केली जात असे. आणि त्याचा वापर पाण्याचा साठ्यासाठी केला जात असेल. खडकांमध्ये असणारे झरे आणि पावसाचे पाणी अशा दोन स्त्रोतांद्वारे या टाक्यांमध्ये पाणीसाठा होत असे. कन्हेरी लेण्यांमध्ये सर्वात जुने टाके दिसून येतात. पुढील काळात कित्येक किल्ल्यांवर असे टाके बांधले गेले.
    महाराष्ट्रमध्ये लहान मोठे मिळून किमात १५०० बारव अस्तित्वात असावेत. यांपैकी कित्येक बारव आज अतिशय भग्न अवस्थेत आहेत. बर्‍याच ठिकाणी हे बारव बुजून गेले आहेत किंवा बांधकामाठी बुजविण्यात आले आहेत. मात्र या बारवांना भग्नावस्थेतून काढून स्वच्छ केल्यास जलव्यवस्थापनासाठी त्यांचा खूप उत्तम प्रकारे वापर केला जाऊ शकतो. काही वर्षांत त्यादृष्टीने प्रयत्न सुरू झालेले आहेत. येणार्‍या काळात सर्वच गावांमध्ये लोकसहभागातून अशी कार्ये हाती घेतल्यास नक्कीच फायदा होणार आहे. गरज आहे ते लोकांना बारवांचे महत्व पटवून देण्याची आणि सकारात्मक बदल घडवून आणण्याची.
   बारवेच्या संदर्भामध्ये त्यांचे पावित्र्य जपण्याच्या दृष्टीने अनेक लोककथा रुढ झाल्याचे विविध स्थल महात्म्यातून दिसते व पौराणिक संदर्भही याला पुष्टी देतात. बारव निर्मितीचे तंत्र आणि त्यांचे आकार-प्रकार याविषयी प्राचीन ग्रंथातून उल्लेख आढळतात. श्री भुवनदेव यांनी लिहिलेल्या अपराजितपृच्छा (सन ११७५ ते १२५०) या ग्रंथात "वापीकूपतडागादिनिर्णयो नाम" या मथळयाचे प्रकरण आहे. यात म्हटल्याप्रमाणे नगराच्या बाहेर व आत निरनिराळया प्रकारचे जलाशय असावेत. विहीर, वापी हे कूपाचे प्रकार होत. कुंड म्हणजे तीर्थक्षेत्रााच्या ठिकाणी स्नानासाठी बांधलेले मोठ्या आकाराचे पण उथळ हौद होत. कूपाचे दहा, वापीचे चार, कुंडाचे चार व तडागाचे सहा प्रकार या ग्रंथात दिले आहेत. नंदा म्हणजे एक मुख व तीन कूट असलेली वापी. मुख म्हणजे विहिरीच्या पाण्याच्या पातळीपर्यंत जाण्यासाठी विहिरीस असलेला प्रवेश मार्ग, तर कूट म्हणजे चौरस खोली, मंडप किंवा माड होय. हे आकाराने चौरस किंवा आयताकृती असतात. नंदाच्या नंतर भद्रा (दोन मुख व सहा कूट), जया (तीन मुख व नऊ कूट), विजया ( चार मुख व बारास कूट) असे प्रकार दिले आहेत. याज्ञवल्क्य, कात्यायन यांनी वापी, कूप तडाग यांच्या व्याख्या दिल्या आहेत.
 नगररचनेचा विचार करता बारवेला स्वतंत्र असे स्थान होते. बृहत्कल्पसूत्रभाष्य या ग्रंथात या विषयी नोंद आढळते. ज्या गावात मध्यभाग सखल व इतर भाग उंच आहे, ज्या गावात मध्यभागी बारव आहे आणि तेथील घरांची रचना वर्तुळाकार आहे अशा वसतीला "उत्तन मल्लकाकार" असे संबोधले जाई. बारव निर्मितीची प्रेरणा स्मृतीग्रंथ व पुराणांनी सतत दिली आहे. बारव स्थापत्याच्या विकासाबरोबरच त्यातील देवताविषयक संकल्पनाही स्पष्ट होत गेल्या. कंधार येथील राष्ट्रकूटकालीन विहिरीमध्ये देवता ठेवण्यासाठी रिक्त जागा मुद्दाम ठेवली असली तरी देवकोष्ठे बांधलेले नाही. सप्तमातृका किंवा नागदेवता यांची विहिरीलगत स्थापना करणे येथपासून अष्टदिक्पाल तसेच विष्णूच्या चोवीस रुपांची स्थापना बारवेत करणे यासारख्या बाबींचा विकास झाला. जागजी (जिल्हा उस्मानाबाद), पिंगळी (जिल्हा परभणी) याठिकाणी अशा मूर्तीची स्थापना झाली. ईडोळी (जिल्हा जालना) येथे एकादशरुद्रमूर्तीची स्थापना करण्यात आली, तर लोणार येथील बारवेत आज मूर्ती नसल्या तरी तेथे असलेल्यास देवकोष्ठावरून एकूण एकतीस देवतांनी स्थापना झाली असावी असे दिसते.

बारवेचे कॉम्प्युटराईज्ड मॉडेल

   मध्ययुगीन बारर्वेच्या संदर्भामध्ये शेषशायी विष्णुमूर्ती ही प्रमुख देवता असल्याचे स्पष्ट होते. गुजरातमधील अनहिलवाड - पाटण जवळील "राणीकी वाव" याठिकाणी एकूण सात मजली विहीर सोळंकी वंशाने निर्माण केली, ज्यात २५० पेक्षा अधिक देवतामूर्ती होत्या. एवढी मोठी बारव महाराष्ट्रात आढळत नाही. असे असले तरी सिंदखेडराजा येथील पुतळा बारव किंवा त्र्यंबकेश्वर येथील अठराव्या शतकातील कुशावर्त हे तीर्थ तीन कूट व एक प्रवेश असलेले उल्लेखनीय कुंड आहे.
    महाराष्ट्रातील बारवांची वर्गवारी अनेकप्रकारे केली जाऊ शकते. उदा. त्यांचे रुढ नाव, त्यांचे विधान, त्यांचा उपयोग, त्यातील देवकूलिकांची संख्या इ. बारवांचे स्थापत्यशास्त्रीय वैशिष्ट्य, त्यांचे विधान व प्रवेश (मुख) विचारात घेता त्यांची पुढील प्रमाणे वर्गवारी करता येईल.
१) कुंड:
कुंड म्हणजे तीर्थस्थानाच्या ठिकाणी स्नानासाठी बांधलेला मोठ्या आकाराचा हौद यांचा आकार साधारणतः २ ते ३ मीटर खोल व १० मीटर चौरस रुंद असा आढळतो. तेर (जिल्हा उस्मानाबाद) येथे राज्य पुरातत्व विभागाने केलेल्या साफसफाईच्या वेळी आढळलेले कुंड हे महाराष्ट्रातील सर्वात प्राचीन कुंड असून ते विटानी बांधलेले आहे. ८.३० चौ. मी. आकाराच्या या कुंडाची तळापासून उंची २.७० मी. आहे व ९०  सें. मी. चा एक टप्पा असे तीन टप्पे यात आहेत. इ. स. च्या पहिल्या शतकातील सातवाहन काळातील हे कुंड आहे, तर विदर्भातील मांढळ (जिल्हा नागपूर) येथे चौथ्या शतकातील विटांनी बांधलेले कुंड उपलब्ध झाले आहे. हे वाकाटककालीन असून वाकाटक राजा दुसरा प्रवरसेन व दुसरा पृथिवीषेण यांचे ताम्रपट येथे मिळाले आहेत. कुंड या प्रकारात येणाऱ्या वास्तूंची उदाहरणे होइल, मुखेड, माहूर (जिल्हा नांदेड), पाली (जिल्हा बीड), त्र्यंबकेश्वर (जिल्हा नाशिक) इ. ठिकाणी आहेत. मुद्दाम तयार केलेल्या जलाशयालगतसुध्दा प्रसंगी कुंडांची निर्मिती करण्यात येई.
२ ) विहीर :-
एक प्रवेश असलेली वापी म्हणजे विहीर. याला पायविहीर असेही म्हणतात. यामध्ये वर्तुळ, अष्टकोन व चौरस असे आकार आढळतात.     विहीर ही भारतीय संस्कृतीने जगाला दिलेली देणगी आहे असे मानले जाते. भारतीय संस्कृती मध्ये अगदी पारंपारिक काळातसुध्दा उपलब्ध नैसर्गिक पर्यावरणाचा आणि भूस्तर रचनेचा अभ्यास करण्यात आला होता. असे वैदिक वाङमयातील नोंदी विशेषत: ऋग्वेद, अथर्ववेद परिशिष्ट यात पाणी व्यवस्थापन व जलप्रवाहाच्या संदर्भात काही नोंदी मिळतात. राहाटगाडगे किंवा अश्मचर्क याविषयीच्या नोंदी आल्या आहेत, वहारमीहीर याच्या बृहत्संहितेमध्ये उदकार्गल नामक अध्यायामध्ये (५८) याविषयाच्या काही नोंदी आहेत. तसेच कौटिल्य अर्थशास्त्रात सुध्दा आपणाला उपलब्ध होणार्‍या माहितीचा विचार आहे. कुठल्या भूप्रदेशात निश्‍चित किती पाणी उपलब्ध होईल, त्यात पावसापासून उपलब्ध होणारे पाणी किती असेल, याविषयीचे काही आराखडे नोंदविले आहेत. याशिवाय अगदी महाभारत, रामायण सारखे महाकाव्य, बौद्ध जातक कथा व वाडमय या सर्वांमधून पाणी व्यवस्थापनाविषयी नोंद मिळते. पौराणिक साहित्याचा विचार करता माणसाने करावयाच्या समाज उपयोगी कामामध्ये वापी, कुप, तडाग यासारख्या वास्तूंच्या निर्मितीसाठी प्रोत्साहन दिल्याचे दिसते.
वापी कूप तडागानि देवतायतनानि च।
अन्नप्रदानमारामं पूर्तमित्यभिधोयते॥
अपरार्क टिकेमध्ये पूर्तकर्मविषयक आलेला हा श्‍लोक महाभारतातून घेतला आहे.

     इष्टकर्म हे माणसाच्या व्यक्तिगत जीवनात महत्वाचे असले तरी पूर्तकर्म हे समाजासाठी अशा प्रकारची बांधकामे करतांना परिसरातील भूस्थर रचनेची चांगली माहिती असावी लागते. भावप्रकाश या ग्रंथात विहीरीचे लक्षणनोंदवतांना म्हटले आहे की, अल्पविस्तार असलेल्या भूमीत खोल व गोलाकार, खणलेली - बांधलेली विहीर होय. कौटिल्य अर्थशास्त्रामध्ये नोंदवले आहे की, मातीला लोणा लागणार नाही, अशा जागी चौकोनी विहीर खोदावी. तिचा तळ आणि सर्व बाजू बांधून काढाव्यात. तिला भुईसपाट लाकडाची बळकट दारे असावीत, तिच्यात तीन मजले व अनेक कोठड्या असाव्यात. अशा विहीरींच्या संदर्भात अनेक प्रकारच्या साहित्यिक नोंदी उपलब्ध होतात.  ज्या ठिकाणी नदीच्या काठावर किंवा तिच्या उपनद्यांच्या काठावर एका मर्यादित प्रमाणात मानवी वसाहत होती, तेव्हा प्रारंभिक काळात विहीरींची आवश्यकता नव्हती. पण ज्यावेळी निसर्गत: सहज उपलब्ध असणार्‍या जलप्रवाहाच्या पलीकडील क्षेत्रात वसाहतीकरणाची गरज माणसाला वाटली तेव्हा भूमीअंतर्गत असलेल्या भूगर्भजलाचा शोध घेतला गेला. व त्यातून विहीर, वापी, बारव या जलस्थापत्य प्रकाराचा विकास झाला. त्यामुळे माणसांना वेगवेगळ्या क्षेत्रात वसाहती करणे शक्य झाले.
  वास्तविक पाहाता बारव निर्मितीच्या मागे असलेली प्रेरणा ही मानवी वसाहतीची गरज हीच होती. विहीरींच्या विविध आकार - प्रकारांचे व तिच्या शुशोभिकरणाचे प्रयोग करताना त्या त्या स्थानाचे भौगोलिक वैशिष्ट्य, पाण्याचे पावित्र्य, शुध्दता जपण्याचा केलेला प्रयोग आपण या अशा वास्तूत जपण्याचा केलेला प्रयोग आपण या अशा वास्तूत असलेल्या वैशिष्ट्यपूर्ण देवतांच्या मधून अनुभवी शकतो.
 यासाठी म्हणून विविध कथानकांची व परंपरांची निर्मिती ही झाली. याची नोंद मध्ययुगीन साहित्यात पाहावयास मिळते. महानुभाव पंथ संस्थापक चक्रधर स्वामी, श्री ज्ञानदेव किंवा संत रामदास यांच्या दासबोध या ग्रंथात याविषयीचे उल्लेख पाहावयास मिळतात.
.
३ ) आड:-
द्वारहीन जलाचा संग्रह म्हणजे कूप. यालाच आड असे म्हणता येईल. ही केवळ मर्यादित उपयोगासाठी बांधलेली वास्तू असून याला प्रवेश मार्ग नसतो. आडाचा आकार साधारणपणे एक मीटरपेक्षा कमी व्यासाचा असतो. यामध्ये प्रामुख्याने चौरस, अष्टकोनी आकार आढळतात. कंधार येथे अष्टकोनी आकारातील आड असून त्याची रचना वैशिष्ट्यपूर्ण आहे. एखादी टोपली विणावी त्याप्रमाण दगडी शिळांची रचना असलेला हा आड खालील बाजूस निमुळता होत जातो. मुखेड (जिल्हा नांदेड) येथील चालुक्यकालीन दाशरथेश्वर मंदिराजवळील चौरस आड ९०  x ९० सें. मी. चा आहे.
४ ) कल्लोळ :-
कुंड या वास्तू प्रकारचे थोडं विकसित स्वरूप म्हणजे कल्लोळ प्रामुख्याने मंदिराच्या समोर किंवा प्राकारात बांधलेले असतात. याला बारवंसारखे प्रवेशमार्ग व टप्पे असतात, पण बारवेच्या तुलनेत आकार व विस्तार, लहान असतो. हतनूर (जिल्हा परभणी) येथील कल्लोळ हे यादवकालीन असून शके १२२३ मध्ये या स्थानाचा जीर्णोध्दार केल्याचा लेख उपलब्ध आहे.
५ ) पोखरणी:-
पोखरणी हा शब्द यादव काळात पुष्करणी यासाठी रूढ होता. पोखरणी हे पुष्करणीचे प्राकृत रूप होय. लीळाचरित्रातूनही ही संज्ञा येते. बारवेपेक्षा विस्तीर्ण जलाशय म्हणजे पोखरणी. याचे स्थापत्य शास्त्रीय वैशिष्ट्य म्हणजे कमी खोलीवर विस्तीर्ण असा भाग तळाशी ठेऊन बांधकाम करतात. स्वाभाविकपणे यात टप्पे असत नाहीत. बारवेच्या तुलनेत कमी रुंदीचे बांधकाम असते. पोखरणीचे ठळक वैशिष्ट्य म्हणजे समतल भाग जास्तीतजास्त मोठे ठेऊन कमीतकमी टप्यात पूर्ण केलेले बांधकाम होय. अशा वास्तूचे वर्णन करताना कमलवेलीनी युक्त असलेला जलाशय म्हणजे पुष्करणी असेही म्हटले जाते. याच्या मध्यभागी काही वेळा मंडप उभारतात. विशेषतः दक्षिण भारतात अशा वास्तू आढळतात. मद्रास येथील कपिलेश्वर मंदिराजवळील जलाशय, तिरूपती व मदुराई येथील जलाशय उल्लेखनीय आहेत. महाराष्ट्रामध्ये औंढा नागनाथ (जिल्हा परभणी), अंबड (जिल्हा जालना), त्र्यंबकेश्वर (जिल्हा) नाशिक), होट्टल (जिल्हा नांदेड)

६ ) तडाग :-
पोखरणीपेक्षा मोठ्या जलाशयाला तडाग-तळे किंवा तलाव म्हणतात. निसर्गतः उपलब्ध पाणलोट क्षेत्राची निवड करून योग्य ठिकाणी बंधारा बांधून निर्माण केलेला जलाशय म्हणजे तडाग,

कुंड हा मुळात या वास्तुप्रकाराचा आधारभूत घटक ठरतो. या कुंडाच्या वर विशिष्ट पायऱ्या ठेऊन एक पटांगण-सोपान (टप्पा) ठेवतात. त्यानंतर दुसरा व तिसरा सोपान ठेऊन झालेला विस्तार बारव स्थापत्यात पहावयास मिळतो. थोडक्यात, एकात एक लहान होत जाणारे कुंड असे याचे स्वरूप असतं. बारवेत विविध देवतांची स्थापना केली जाते. त्यासाठी असलेली देवकोष्ठे सर्वात वरच्या सोपानावर स्वतंत्र अशी किंवा अगदी संरक्षक भिंतीत आणि प्रवेश मार्गाच्या दोन्ही बाजूंना ठेवतात. बारवेत प्रामुख्याने चौरस आकार आढळतो. आयत व क्वचित् अष्टकोनी आकार पहावयास मिळतात. बारवेस एक ते चार मुख-प्रवेश असतात.
श्री. भुवनदेव यांनी लिहिलेल्या "अपराजितपृच्छा" (सन ११७५ ते १२५० ) या ग्रंथात "वापीकूपतडागादिनिर्णयोनाम" या मथळ्याचे प्रकरण आहे. ह्यात विश्वकर्मा आणि त्याचा नातू अपराजित ह्याच्या मध्ये वास्तुनिर्मीति ह्यावर संभाषणे आहेत. यात म्हटल्याप्रमाणे नगराच्या बाहेर व आत निरनिराळ्या प्रकारचे जलाशय असावेत. विहीर, वापी हे कूपाचे प्रकार होत. कुंड म्हणजे तीर्थक्षेत्राच्या ठिकाणी स्नानासाठी बांधलेले मोठ्या आकाराचे पण उथळ हौद होत. कूपाचे दहा, वापीचे चार, कुंडाचे चार व तडागाचे सहा प्रकार या ग्रंथात दिले आहेत.
१) नन्दा भद्रा जया चैव चतुर्थी विजया तथा ।
एकवक्त्रा त्रिकूटा च नन्दा नाम वरप्रदा ॥ 9 ॥
अर्थ:- वापी किंवा बारव चे चार प्रकार आहेत - (१) नंदा (२) भद्रा (३) जया (४) विजया
यापैकी 'नंदा' वापी एकमुखी आहे आणि तीन बाजूंनी बंद आहे. मुख म्हणजे विहिरीच्या पाण्याच्या तळापर्यंत जाण्यासाठी विहरीला असलेला प्रवेशमार्ग. कूट म्हणजे चौरस खोली, मंडप किंवा माड होय. हे चौरस किंवा आयताकृती असतात. अशाप्रकारे नंदा नावाचे वापी हे नावानुसार वरदान आहे.
१) द्विवक्त्रा च षट्कूटा भद्रा नाम सुशोभिता त्रिवक्त्रा नवकूटा च जया वै देवदुर्लभा ॥ 10 ॥
अर्थ:-"भद्रा" नावाच्या दुसऱ्या वापीला दोन मुख आहेत, म्हणजे त्यात दोन बाजूंनी प्रवेश आहे, त्यांना सहा कूट आहे, अशा प्रकारे भद्रा सजवली आहे.
"जया" नावाच्या तिसऱ्या वापीला तीन मुख आहेत, आणि नऊ कूट आहेत. हे खूप चांगले आहे. अशी वापी देवतांना सुद्धा दुर्मिळ मानली जाते.
३ ) चतुर्वक्त्रा सूर्यकूटा विजया सर्वतोमुखी II
अर्थ:-विजया नावाच्या चौथ्या वर्णाच्या वापीलाचार मुख आणि बारा कूट आहेत.

बारवेवी रचना :-

जसजसे मानवी वस्ती नदीपासून दुरच्या ठिकाणी वसविली जाऊ लागली, तशी पाण्याची गरज भागविण्यासाठी इतर पर्यायांचा विचार केला जाऊ लागला. भुगर्भातील पाण्याच्या वापरासाठी विहिरी बांधण्याची पद्धत पुर्वी सिंधू संस्कृतीमध्ये दिसून येते. याच विहिरींना नविन स्वरूपात निर्माण केले जाऊ लागले. हे नविन स्वरूप होते बारव अथवा कुंडांचे. बारवांचा आकार विहीरींपेक्षा खूप मोठा आणि पसरट असा होता. हे बारव जमिनीत अगदी १० ते १५ फुट पासून १५० – २०० फुट खोलीपर्यंत बांधले जात होते. कोकण भागात भौगोलिक रचनेमुळे पाणी साठवून ठेवणे कठीण आहे. त्यामुळे कोकण भागात असे बारव कमी प्रमाणात आढळतात. तर विदर्भात पावसाचे प्रमाण तुलनेने जास्त असल्याने त्या भागात नैसर्गिक जलाशये जास्त प्रमाणात आढळतात. मात्र कमी पर्जन्यमान असलेल्या मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रात बारव जास्त प्रमाणात आहेत. या बारवांचा उपयोग भुगर्भातील पाण्याचा वापर करणे आणि पावसाचे पाणी जमिनीत मुरवणे आणि साठवून ठेवणे यासाठी केला जात असे.

बारव हा शब्द बाव या शब्दापासून आला आहे. बाव हे लांबी मोजायचे पारंपारिक माप आहे. एक बाव म्हणजे १.५ मीटर. बारवेच्या मध्यभागी भुजलाच्या खोलीपर्यंत पोहचणारा खड्डा खोदलेला असतो. या खड्डयाच्या चारही बाजुने उतरत्या पायर्या बांधून लोकांना पाणी गोळा करण्याची व्यवस्था केलेली असते. बारवा या चौकोनी, आयताकृती किंवा अष्टकोनी आकाराच्या असतात, त्यांना चारही बाजुने कुंपणाची भिंत बांधलेली असते. पाणी घेण्यासाठी वाट बघण्यासाठी किंवा विश्रांतीसाठी एक किंवा अधीक बाजुला मंडप उभारलेला असतो.  याचे भरपूर प्रकार आहेत. पायऱ्यांची विहीर या बोली भाषेतील शब्दांत बारवेची नेमकी व्याख्या आली आहे. इतर विहिरींतून पाणी उपसण्यासाठी पोहऱ्याचा वापर करावा लागतो किंवा मुळात या विहिरींचा उद्देशच पाणी उपसून त्याचा शेतीसाठी किंवा पिण्यासाठी उपयोग करणे, असा असतो.
बारवेच्या बाबतीत मात्र, पाणी मोटेने उपसणे हा मूळ हेतू नाही. बारव ही त्या प्रदेशांतील जलव्यवस्थापनाचे केंद्र असते. बारवेच्या जवळपास उंचीवर एखादा तलाव, पाणीसाठा, नदी असते. त्या पाण्याचे जमिनीखालचे प्रवाह शोधून, त्याच्या नेमक्या बिंदूवर बारव बांधली जाते. पायऱ्या असल्याने तिचा उद्देश पाणी प्रत्यक्ष घागरीने, म्हणजेच हाताने घेणे, असा असतो. मंदिर परिसरांत बांधलेल्या बारवांना कुंड, तीर्थ, कल्लोळ अशी नावे असतात.
    प्राचीन मंदिरांच्या परिसरांत बारवा आढळतातच. त्यातही नृसिंहासारखे उग्र देवतेचे मंदिर असेल, तर जवळ पाणी, नदीचा काठ किंवा कुंड असते. परभणी जिल्ह्यातच पोखर्णी येथे नृसिंह मंदिर आहे. गावाचे नावच पोखर्णी नृसिंह असे आहे. हे मंदिर आता आधुनिक झाले आहे. प्राचीन मंदिराचे काही अवशेष आता नाहीत; पण मंदिराला लागून उतरत्या पायऱ्यांची जुनी भव्य बारव आहे; ती आजही वापरली जाते. पाण्याचा उपसा नियमित केला जातो. बारवांतील पाण्याचा उपसा नियमित झाला, तर त्या चांगल्या राहतात. सोबतच भोवतालच्या आडांनाही पाणी राहते.

अंबेजोगाई (जि बीड) येथील एक बारव

बारवांची निर्मिती चालुक्य काळात आणि नंतर मोठ्या प्रमाणात झाली असली तरी त्यपुर्वीदेखिल बारवांचा वापर नक्कीच होत होता. तेर (जि धाराशिव) येथे इस १ ल्या शतकातील एक बारव सापडली आहे. मांढळ (जि नागपूर) येथे ४ थ्या शतकातील म्हणजे वाकाटककालिन बारव सापडली आहे. तर मानसपुरी (जि नांदेड) येथे एक राष्ट्रकुट काळातील बारव सापडली आहे. आज दिसणार्‍या बहुतांश बारव मात्र चालुक्य, यादव आणि विजयनगर काळातील आहेत.
     या बारवांना पाण्यापर्यंत जाण्यासाठी पायर्‍यांची निर्मिती केली जात असे. काही ठिकाणी एका बाजुने, काही ठिकाणी दोन बाजुने तर काही ठिकाणी चारही बाजुंनी अश्या पायर्‍यांची सोय केलेली दिसून येते. बारवांची रचना, पायर्‍यांची व्यवस्था, आकार यांच्या आधारावर कुंड, विहीर, आड, कल्लोळ आणि बारव असे विभागीकरण करता येऊ शकते. विहीर गोल आकाराची आणि खोल असते. आड देखिल विहिरीप्रमाणेच मात्र कमी खोलीचे असतात. विहीर आणि आडामध्ये आत उतरण्यासाठी पायर्‍यांची सोय नसते. पाणी बाहेर काढण्यासाठी रहाटाचा वापर करण्यात येतो. कुंड हे पसरट आकाराचे, मात्र कमी खोलीचे असते. कुंडामध्ये उतरण्यासाठी चारही बाजुंनी पायर्‍यांची सोय दिसून येते. कल्लोळ हे देखिल कुंडाप्रमाणेच, मात्र आकारात लहान आणि मंदिराच्या आतमध्ये असते. तुळजापुर किंवा त्र्यंबकेश्वर येथे असे कल्लोळ दिसून येतात. बारव हे विहीर आणि कुंड या दोघांचे मिश्रण. आकाराने पसरट, खोलीला कुंडापेक्षा थोडे जास्त, आणि पाण्यापर्यंत जायला एक किंवा अधिक बाजुने पाय‍र्‍या अशी बारवेची संरचना असते. हे बारव वर्तुळाकार, चौरस, आयात, षटकोन, आष्टकोन अशा विविध आकारांमध्ये दिसून येतात.

सिद्देश्वर मंदिर, लातूर येथील बारव

बारव आणि कुंडांच्या ठिकाणी विविध देवतांच्या मुर्त्या देखिल दिसून येतात. कित्येक बारव हे मंदिराच्या परीसरात किंवा जवळपास असतात. पुर्वी असलेल्या मंदिराच्या जवळपास बारव बांधले गेले, किंवा बारव बांधल्यावर शेजारी मंदिराची निर्मिती केली गेली हे माहित नाही. मात्र मंदिर आणि बारव यांचा परस्पर संबंध मात्र जाणिवपुर्वक केला गेला असवा. बारवाची स्वच्छता आणि रखरखाव टिकवून ठेवण्यासाठी त्याला पवित्र्याची जोड देणे नक्कीच खूप सोयीचे होते. ज्याठिकाणी बारव मंदिर परीसरात नव्हती तेथे बारवांच्या पायर्‍यांच्या बाजूने अथवा भिंतींमध्ये देवकोष्ठ बांधून त्यामध्ये देवतांच्या मुर्त्या स्थापित केल्या गेल्या. आज यामधिल खूप कमी ठिकाणी मुर्त्या अस्तित्वात आहेत. आणि जेथे आहेत तेथे खूप भग्न अवस्थेत आहेत. काही बारवांच्या बाजूने मंडपांची रचनादेखिल आढळून येते. ही रचना कदाचित धार्मिक विधींसाठी असावी. किंवा बारवेमध्ये आंघोळ केल्यानंतर कपडे बदलण्याची जागा म्हणून या मंडपांचा वापर केला जात असण्याचीदेखिल शक्यता आहे.


   बारवांची खोली ही एका मर्यादेपेक्षा अधिक नसते. शिवाय यातील पाण्याची पातळी एका मर्यादेपेक्षा अधिक वाढत नाही. बारवांमध्ये पायर्‍या असल्याने, पाण्यापर्यंत जाणे शक्य होते. सर्वांत महत्त्वाचा वैज्ञानिक उद्देश असा की, जमिनीत जे भूजलाचे साठे असतात, त्यातील एका केंद्रबिंदूवर बारव खोदलेली असल्याचे आढळून येते. अशा रचनेमुळे जमिनीखाली निर्माण होणार्‍या हवेच्या पोकळीतून हवा बाहेर पडण्यास मदत होते, शिवाय यामुळे आजूबाजूंच्या विहिरींची पाणीपातळीही वाढते. पूर्वजांनी या सर्व बाबींची जाणीव ठेवून बारवा खोदल्या. त्याचबरोबर बारवांच्या ठिकाणी मंदिरेही उभारली. जेणेकरून बारवांची स्वच्छता राखण्यास मदत होईल.
    बारव स्थापत्यामध्ये विविध आकार व प्रकार आढळतात. तसेच बारवेत कूट किंवा मंडप पण दिसतात. लोकभाषेत अशा बारवांना 'माड' म्हणतात. बारवेची पुढील अवस्था म्हणजे कूट, सज्जायुक्त मंडप होय. हे चौरस आकारातील बहुतांश आयताकार असतात. बारवात जसे एक ते चार प्रवेशद्वार आढळतात तसेच आजूबाजूला सर्व वाजून विकसित झालेला मंडप आढळतो. महानुभाव साहित्यात अशा बारवांना "जलमांडवी" म्हटलं आहे. अन्य बारवेच्या बांधकामापेक्षा हे जास्त खर्चिक असतं. बारव निर्मितीची या स्थापत्याची उपयुक्तताच यातून स्पष्ट होते. त्यातील प्रकार खालीलप्रमाणे,
१ ) एकमंडपयुक्त बारव :-
ह्यात एक मंडप असतो. लोणी भापकर येथे अशी बारव असून त्यात एक मंडप 28 देवकोष्ठ आहेत. मंडपाच्या स्तंभावरील अलंकरण लक्षणीय आहेत. तसेच ब्राम्हणी (अहमदनगर) येथे सुद्धा आहे.




२ ) दोन मंडपयुक्त बारव:-
उत्तर-दक्षिण भागात दोन मंडप असतात. तीन टप्पे असून. दोन बाजूस स्वतंत्र मंडप बांधलेले असलेला मंडप खालील मुख्य कुंडापर्यंत पुढे आलेले असतात. लोणार (जिल्हा बुलढाणा) या ठिकाणी लिंबी बारव एक महत्त्वपूर्ण बारव असून गावात अन्य कुंडही आहेत. केंद्रिय पुरातत्व विभागाने संरक्षित केलेली ही वास्तू २६ चौ. मी. आकाराची असून एकूण पाच टप्प्यात पूर्ण करण्यात आली आहे. बारवेत सर्वात शेवटी असलेल्या कुंडानंतर पाच पायऱ्या ठेऊन त्यावर एक सोपान ठेवला आहे. हा २५ सें. मी. रुंदीचा आहे. टप्प्यावरील पायऱ्यांना कोठेही पुढे आलेला दट्टा अथवा तोंडशिळा दिसत नाही. यावरील दुसरा सोपान पाच पायऱ्यानंतर असून तो ७० सें. मी. रुंदीचा आहे. त्यानंतरचा सोपान ७३ सें. रुंदीचा आहे. यावरील सोपान सर्वात रुंद असून तो २.१० मी. आहे. या सोपानावर सर्व बाजूंनी मंडप बांधलेला होता. मुळात असलेला हा मंडप आज अस्तित्वात नसून केंद्रिय पुरातत्व जतनविषयक कामानंतरसुध्दा येथे दिसणाऱ्या अवशेषावरून या मंडपाची कल्पना स्पष्ट होते. मंडपातून बाहेर पडणारे प्रवेश मार्ग उत्तर-दक्षिण पश्चिम बाजूस आहेत.
३ ) तीन प्रवेशयुक्त बारव :-
वस्तुतः बारव या स्थापत्य प्रकारामध्ये चार प्रवेश हा सर्वसामान्य प्रकार आढळतो. पण काही वेळा उपलब्ध क्षेत्र व स्थानिक काही कारणांमुळे तसेच पाण्याच्या कमीअधिक उंचीवरील उपलब्धतेमुळे मूळ आराखड्यात काही बदल केल्याचे दिसतात व यातूनच तीन प्रवेशयुक्त बारवांची निर्मिती झाली असावी.
४ ) चार प्रवेशयुक्त बारव :-
बारव स्थापत्यात सर्वत्र रूढ असलेला हा प्रकार असून मधोमध असलेले कुंड व त्यावर विकसित होत जाणारे टप्पे, मुख्य सोपानानंतर असलेली संरक्षक भिंत व चारही बाजूंनी असलेला प्रवेश अशी याची रचना आहे. संरक्षक भिंत उभारताना एक सलग गजथर उभारून त्यावर विविध दवदेवतांसाठी स्वतंत्र अशी २४ देवकोष्ठ निर्माण केली आहेत. याशिवाय विविध देवता, देवांगना, देवानुचर, देवता परिवार व असूर यांचे शिल्पांकन येथे आहे. विविध प्रकारची भौमितीक नक्षी, अश्वारूढ योध्दे, त्यांच्या कवायती. याशिवाय हंसथर व नृत्यांगना पहावयास मिळतात. देवकोष्ठ उभारताना विकसित मंदिराची लहान प्रतिकृतीच साकार करण्याचा प्रयत्न केला आहे.
"बृहत्कल्पसूत्रभाष्य" या जैन ग्रंथा मध्ये सुद्धा बारव बद्दल माहिती आहे. ह्यातील श्लोक खालील प्रमाणे :-
१ ) नन्दा नन्दवती पुनर्नन्दोत्तरा नन्दिषेणा अरजा विरजा गतशोका वीतशोका विजय वैजयन्ती जयन्ती च।। ९६९।।
अवरा। अपराजिता च रम्या रमणीया सुप्रभा च चरमा पुनः सर्वतोभद्राः। एताः सर्वा रत्नतट्यो लक्षयोजनप्रमिताः पूर्वदिग्भागादितो ज्ञातव्याः।। ९७०।।
अर्थ:- नन्दीश्वर द्वीप च्या पुर्व दिशेला नन्दा, नन्दवती, नन्दोत्तरा आणि नन्दिषेणा ह्या चार वापिका आहेत दक्षिण दिशा मध्ये अरजा, विरजा, गतशोका आणि वीतशोका; पश्चिम दिशा मध्ये विजया, वैजयन्ती, जयन्ती आणि अपराजिता. उत्तर दिशा मध्ये रम्या, रमणीया, सुप्रभा और सर्वतोभद्रा ह्या चार वापिका आहेत हैं. ह्या सर्व वापीकांचे तट अलंकारीत आहेत. ह्या १००००० योजन प्रमाण च्या आहेत.
२ ) अनन्तरं तासां वापीनां स्वरूपमाह—सव्वे समचउरस्सा टंकुक्किण्णा सहस्समोगाढ़ा। वेदियचउवण्णजुदा जलयरउम्मुकजलपुण्णा।I९७१।।
सर्वाः समचतुरस्राः टज्रेत्कीर्णाः सहस्रमवगाधाः। वेदिकाचतुर्वर्णयुता जलचरोन्मुक्तजलपूर्णाः।। ९७१।।
सव्वे ताः सर्वाः समचतुरस्राष्टज्रेत्कीर्णाः सहस्रयोजनावगाधाः l
वेदिकाभिश्चतुर्वनैश्च युक्ताः जलचरोन्मुक्तजलपूर्णाः स्युः।। ९७१।।
अर्थ:- ह्या सर्व वापिका एक लाख योजन लांब आणि एक लाख योजन रुंद अर्थात् समचतुरस्र आकार च्या आहेत. टज्रेत्कीर्ण अर्थात् वरून खाल पर्यंत समान आहेत. खोली १००० योजन प्रमाण आहे. ह्या वापी एक ते चार जंगल च्या जवळ आहेत.
मोठ्या प्रमाणात या वास्तूंची निर्मिती अकराव्या ते तेराव्या शतकात झाली. अभिलेखीय नोंद उपलब्ध असलेल्या बहुतांश बारवा या बाराव्या शतकातील आहेत. उदा. गणेशवाडी येथील विक्रमादित्य सहावा याच्या काळातील लेख, होट्टल येथील चालुक्यकालीन शिलालेख, लातूर येथील भूतनाथ मंदिरातील लेख किंवा धर्मापुरी येथील शिलालेख आज अस्तित्वात असलेल्या वारवांचा विचार करता त्या तंत्रदृष्ट्या उत्कृष्ट होत्या असे म्हणता येईल. त्यामुळे आजही अशा वास्तू कमी-अधिक प्रमाणात उपयोगात आणल्या जातात. जेथे बारव, जलमांडवी, पोखरणी आहेत त्याठिकाणी उपलब्ध शिलालेखांचा अभ्यास करताना हे स्पष्ट होते की, अशा वास्तूची निर्मिती होत असताना केवळ कुठल्या एका विशिष्ट राजवंशाची सत्ता नव्हती; किंबहुना राष्ट्रकूट, कल्याणचे चालुक्य, शिलाहार, कलचुरी यादव या राजवंशांची सत्ता असताना त्या त्या स्थानावरील महत्वाकांक्षी सनानी सामंत, श्रेष्ठी व क्वचित जागी सामान्य गणिकांनीही स्वतंत्रपणं याची निर्मिती केली आहे. स्वाभाविकपण रूढ आराखड्यांना स्वीकारून ही निर्मिती झाली असली तरी काही स्थानिक वैशिष्ट्यंही त्यातून व्यक्त झाली आहेत. उत्तर काळात साधारणतः चौदाव्या शतकानंतर मंदिराची निर्मिती कमी झाली, तसंच अशा प्रकारच्या बारवांची निर्मितीही थांबली. यानंतर विहिरीत चौरस व वर्तुळाकार आणि एका बाजूने प्रवेश असलेल्या विहिरी निर्माण झाल्या. प्रामुख्याने ज्या राजवटीत प्रार्थना मंदिरांवर गोलघुमट बांधण्यात आले त्या काळात कटोरा बावडी हा प्रकार लोकप्रिय झाला. मोठ्या आकाराचे अनेक मजले व दालने असलेल्या विहिरींचीही निर्मिती झाली. यांना कुपागार म्हणणे योग्य ठरते. उत्तर काळातसुध्दा शाश्वतमुल्य असलेल्या बारवांची जपणूक झाली.
        बारव हे केवळ दगडी बांधकाम नाही, की धार्मिक ठिकाणही नाही. ते संपन्न संस्कृतीचे प्रतीक आहे. बारवांचे जतन व संवर्धनासाठी विविध उपयांची गरज आहे. शिवरात्र, चैत्री पाडवा या निमित्ताने या बारवांवर दीपपोत्सव करण्याची प्रथा काही ठिकाणी आहे. ती सर्वत्र होण्याची गरज आहे. लोककला, शास्त्रीय संगीत, नृत्य आदी कार्यक्रम बारवांच्या परिसरात आयोजित करायला हवेत. बारवांचा अभ्यास अभियांत्रिकी, वास्तुशास्त्र, शिल्पशास्त्र; तसेच सांस्कृतिक अंगाने झाला पाहिजे. बारवांच्या बांधकामांत सौंदर्य, उपयुक्तता, पाण्याची गरज, धार्मिक भावना असा सर्वांगीण विचार केला गेला आहे. पर्यटनाच्या दृष्टीनेही बारवांचा विचार व्हायला हवा.प्रत्येक स्थानावर असलेल्या वास्तूची वैशिष्ट्य व त्या त्या काळामध्ये जाणीवपूर्वक, विकसित झालेल्या जल व्यवस्थापनाच्या वैशिष्ट्यांचा परिचय करून घेणे ज्ञानवर्धक व रंजक ठरते.

अहिल्याबाई यांनी बांधलेल्या विहिरी किंवा बारव :

लढाईवर दौड करणाऱ्या लोकांसाठी तसेच तीर्थयात्रेला जाणाऱ्या लोकांसाठी रस्त्यात पाण्याची सोय व्हावी. तेथील लोकवस्तीची पाण्याची सोय व्हावी यासाठी विहिरी खोदल्या होत्या. असे संशोधनातून दिसून येते. राजा अशोक, शेरशहासूर, अहिल्याबाई इत्यादीने अशा लोकपयोगी विहिरी बांधल्या आहेत. अशा प्रकारे संपूर्ण भारतात अहिल्याबाई होळकरांनी अनेक ठिकाणी विहिरी बांधलेल्या आहेत. त्यातील काहीचे उल्लेख सापडतात परंतु प्रत्यक्षात अनेक ठिकाणी अहिल्याबाईंनी विहिरी बांधलेल्या आढळून येतात त्यांना लोक अहिल्याबाई काळातील विहिरी किंवा बारव म्हणून उल्लेख करतात. अहिल्यादेवी होळकर यांच्या कार्यकाळात विविध प्रकारची स्थापत्य निर्मिती झाली. पानिपतच्या युद्धात सैन्याला पाण्याच्या अभावी भरपूर त्रास झाला हे लक्षात घेऊन अहिल्यादेवींनी विविध ठिकाणी बारव, तलाव, विहीरी यांची निर्मिती केली. याचा फायदा सर्वसामान्य जनतेला देखील झाला.
 अहिल्याबाईंच्या आधीच्या काळातील बारवा चारही बाजूंनी ओवऱ्या असलेल्या, उतरत्या पायऱ्या असलेल्या आहेत. (उदा. पुष्करणी बारव चारठाणा, ता. जिंतूर जि. परभणी; मादळमोही ता. गेवराई, जि बीड) या बारवांमध्ये देवकोष्ठ आढळतात. त्यात अष्ट दिक्पाल, शेषशायी विष्णू, गणेश, सप्तमातृका किंवा आसरा आदी देवता आढळतात. त्यांची पूजा केली जाते. शेषशायी विष्णूच्या अतिशय सुंदर मूर्ती जुन्या बारवांमध्ये दिसतात. यातील अप्रतिम शिल्पसौंदर्य असलेल्या दोन मूर्ती आजही मराठवाड्यात आहेत. एक मूर्ती परभणीच्या टाकळकर राममंदिरात (गांधीपार्क) आहे, तर दुसरी पैठणला जुन्या नाथ मंदिराजवळच्या नृसिंह मंदिरात आहे. या मूर्ती बारवांतील असल्याचे तज्ज्ञ सांगतात. अष्ट दिक्पाल, म्हणजेच आठ दिशांच्या देवतांच्या मूर्ती. या शेषशायी विष्णू मूर्तीच्या प्रभावळीत दिसतात. यांच्या स्वतंत्र मूर्तीही असायच्या. वालूर (ता. सेलू, जि. परभणी) येथे वर्तुळाकार, आठ दिशांनी आठ पायऱ्या उतरत गेलेली (हेलिकल) बारव कचरा काढल्यावर समोर आली. तिला आठ देव कोष्ठ आहेत. ६४ योगिनींच्या मूर्ती असलेली खांबपिंपरी (ता. शेवगांव, जि. अहमदनगर) येथील बारव तर अतिशय महत्त्वाचा असा ऐतिहासिक ठेवा पोटात बाळगून आहे. संपूर्ण भारतभर ६४ योगिनींच्या मूर्ती या शिवाय फक्त दोनच ठिकाणी आहेत. ही बारव पुरातत्त्व विभागाने अधिगहीत करण्याची कारवाई सुरू केली आहे.बंगाली बारव अहिल्यादेवी होळकर यांनी बांधली आहे. जेजुरीमध्ये येणाऱ्या खंडोबाच्या भक्तांना पाणी या उद्देशाने याची निर्मिती केली गेली. अनेक वर्षापासून या बारवमध्ये घाण, दगडगोटे साचले आहेत. याशिवाय जेजुरी येथील जानाई बारव, सुपे येथील राखुंडी बारव, तसेच धामारी येथील वाघेश्वर बारव जेजुरीजवळील इजाळा (कडेपठार) आणि सुपे येथील सिद्धेश्वर बारव यांचा समावेश होतो. महाराष्ट्राबाहेरही कर्नाटकातील गुडीबंडे येथे वसलेली बेलागिरी रंगणा बारव याचा ही समावेश यात आहे.
याशिवाय इजाळा (कडेपठार, जेजुरी, पुणे), सिद्धेश्वर बारव (सुपे, पुणे), मुक्ताई बारव (पिचडगाव, अहिल्यानगर), गुरुपन्ना बावी (गुडीबंडे, कर्नाटक), अंधारी बारव (कोंढापुरी, पुणे), ओढा (कोंढापुरी, पुणे), मस्तानी तलाव (पाटस, पुणे), जुना बाजारतळ (पाटस, पुणे), गाव वेस (पाटस, पुणे) येथे बारव आहेत.
नेवरी (सांगली), जयराम स्वामी मठ (वडगाव ज.स्वा, सातारा), शिंदे विहीर (वडगाव ज.स्वा, सातारा), मामलेदार कचेरी (सासवड, पुणे), भापकर आळी (लोणी भापकर, पुणे), नारायणेश्वर (नारायणपूर, पुणे) येथील बारव बघायला मिळतात.
     अहिल्याबाईंच्या काळानंतर बारवांची रचना जराशी बदलत गेलेली दिसते. वेरूळची, अहिल्याबाईंच्या काळातील बारव ‘शिवतीर्थ’ नावाने ओळखली जाते. ती अतिशय देखणी आहे. या बारवेत आठ छोटी मंदिरे आहेत. जुन्या बारवांमध्ये देवकोष्ठ असत, त्याऐवजी येथे मोठ्या खोल्या अथवा दालने दिसतात. त्यांचा उपयोग स्त्रियांना कपडे बदलण्यासाठी करता यायचा. आजही ही दालने वापरली जातात. अहिल्याबाईंच्या काळातील किंवा त्या नंतरच्या बारवांत मात्र अशी रचना नाही. या बारवा भक्कम दगडी बांधणीच्या असून, त्यांत उतरण्यासाठी एका बाजूने पायऱ्या खोदलेल्या असतात. बाकीच्या बाजू भक्कमपणे दगडी चिऱ्यांत बंदिस्त असतात. चोंडाळा (ता. पैठण, जि. औरंगाबाद) येथील बारव होळकर संस्थानचे दिवाण चंद्रचूड जहागीरदार (न्या. चंद्रचूड यांचे घराणे) यांनी बांधलेली असून, ती अशा पद्धतीच्या बारब बांधकामाचा उत्कृष्ठ नमुना आहे. या बारवांत एका बाजूला पाणी उपसण्यासाठी मोट लावण्याची सोय आहे. त्याला ग्रामीण भागात बगाड म्हणतात. ही बगाड कमानींच्या रूपात अतिशय देखणी केलेली असते.

  • चांदवड येथील नरोटी बारव – चांदवड गावात ही विहीर “नरोटी बारव” म्हणून प्रसिद्ध आहे. ही विहीर अहिल्याबाई होळकरांनी बांधलेली आहे. पक्की विहीर सदरहूव जुनी बांधलेली असून गंत्री बागेत आहे. सर्वे ५६ नरोटी बारव आजही चांगल्या स्थितीत आहे. या विहिरीला आजही भरपूर पाणी आहे. गावातील लोक आजही या विहिरीचे पाणी वापरतात. ही बारव काळ्या धडी दगडाची बांधलेली आहे. आतमध्ये एक कुंड असून त्यात पाणी आहे.
  • सकरगाव ता. निफाड जि. नाशिक येथील विहिर – निफाड या शहरापासून १५ कि. मी. अंतरावर सकरगाव आहे. या गावाला व भागाला ऊस, कांदे, द्राक्षे यामुळे महत्त्व प्राप्त झाले आहे. हे गाव पूर्वी खानदेश परगण्यात येत होते. या गावाला अहिल्याबाई होळकरांनी एक मोठी पाय विहिर बांधली आहे. आजही ती अहिल्याबाईची बारव या नावाने प्रसिद्ध आहे. सकरगावची ही विहीर आजही चांगल्या स्थितीत आहे. पूर्वी या गावाची ही एकमेव विहिर पाणीपुरवठ्याचे साधन होते. विहिरीचे बांधकाम दगडांनी व चुन्यात केले आहे.
  • भिमाशंकर येथील विहिर – भिमाशंकर हे १२ ज्योतिर्लिंगातील क्षेत्र आहे. पुण्यापासून ७५ मैला वर आहे. हे थंड हवेचे ठिकाण आहे. येथील भीमाशंकराचे मंदीर हेमाडपंती दगडी बांधणीचे असून त्यावर दशावताराच्या मूर्ती कोरलेल्या आहेत. अहिल्याबाईनी जनतेच्या कल्याणासाठी अनेक कल्याणकारी कामे केली आहेत. भीमाशंकर येथेही यात्रेकरूंची पाण्याची सोय व्हावी यासाठी हि विहिर बांधली आहे. “ती भीमाशंकर येथे धर्मशाळा इमारत, बावडी वगैरे आहे, असा उल्लेख येतो.
  • जेजूरी येथील विहिर –पुणे जिल्ह्यात जेजुरी हे खंडोबाचे देवस्थान संपूर्ण महाराष्ट्रात प्रसिद्ध देवस्थान आहे. जेजुरीचा मल्हारी मार्तंड हे होळकरांचे कुलदैवत. मल्हारराव होळकरांनी मल्हारी मार्तंडांचा किल्ला बांधला. अहिल्याबाई होळकरांनी येथे सरकारी वाडा, श्री गौतमेश्वर छत्री मंदिर, मल्हार तलाव व विठ्ठल रखुमाईचे मंदिर बांधले. याशिवाय एक विहिर बांधली. ‘श्री क्षेत्र जेजुरी पुणे जिल्हा श्री मल्हारे गौतमेश्वर, तालिमखाना, सरकारी वाडा, श्री दत्त पादुतश्पेरे आहित व कुवा आहे.” असा संदर्भ येतो.
  • उज्जेन येथील विहिर –उज्जैन हे प्राचीन काळापासून एक धार्मिक तीर्थक्षेत्र म्हणून प्रसिद्ध आहे. उज्जैन येथे बारा ज्योतिर्लिंगापैकी एक ज्योतिर्लिंग महाकालेश्वर या नावाने ओळखले जाते. तेथील यात्रेकरूंची सोय व्हावी यासाठी अहिल्याबाई होळकरांनी चिंतामणी गणेशाचे मंदिर, जनार्दन मंदिर व घाटाची उभारणी केली. या चिंतामणी गणेशाच्या दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांची सोय व्हावी या दृष्टीने अहिल्याबाईंनी विहिर बांधली आहे. “उज्जैन अंगणात श्री चिंतामण गणपती ३ जमीनबाघे, २ धर्मशाळा, ३ बावडी अंदाजे किंमत ५००० श्री कै. अहिल्या मा. साहेब यांनी बांधले”, अशाप्रकारे कागदोपत्री उल्लेख आहे.
कसारा(थळ घाट) मधील अहिल्यादेवींची टोप बारव
थळ घाटातील (कसारा घाटातील) टोप बावडी (बारव)
मुंबईहून रस्त्याने नाशिकला जाताना वाटेत कसारा घाट लागतो. या घाटाचे मूळ नाव ‘थळ घाट असे आहे.घाट चढताना डाव्या बाजूस दरी व उजव्या बाजूस उंच डोंगर आहे. त्यातल्या एका वळणावर एक अर्धवर्तुळाकार, इग्लूच्या आकाराचे दगडी बांधकाम दिसते.मात्र  घाटात थांबणे धोकेदायक तसेच सतत गाड्यांची वर्दळ त्यामूळे इथून जाणार्या प्रवाशाना हि वास्तु नेमकी काय आहे हे समजत नाही . वास्तविक हि आहे विहीर. जवळपास तीस पस्तीस फूट व्यासाची विहीर असून, त्यात कचरा किंवा जंगली प्राणी पडू नयेत म्हणून दगडी बांधकाम करून टोपलीसारखे छप्पर बांधले आहे. बारव किती खोल आहे, याचा अंदाज त्यात असलेल्या पाण्यामुळे येत नाही. मात्र, आजही बारव स्वच्छ व सुंदर असून, तिच्यात थोडीही पडझोड झालेली नाही. बारववर कुठेही शीलालेख किंवा नक्षीकाम नाही. या बारवचे निर्माण लोकमाता राणी अहिल्यादेवी होळकर यांनी केल्यामुळे ‘राणी अहिल्यादेवींची बारव या नावाने ओळखतात.
आजदेखील त्या डोंगरात वरच्या बाजूला असलेल्या चार वस्त्यांमधील महिला बांधकामात ठेवलेल्या खिडकीवजा खुल्या भागातून पाणी भरतात. मुख्य रस्त्यातून ५० फूट अंतरावरच हि विहीर आहे.
जुन्या काळात वाटसरुंना, यात्रेकरुंना घाटामध्ये विसावा मिळावा व पिण्याच्या पाण्याची सोय व्हावी म्हणून ही विहीर व तिचे हे अर्धवर्तुळाकार घुमटासारखे छप्पर असलेले बांधकाम अहिल्याबाई होळकर यांनी बांधले. अहिल्याबाई होळकर यांच्या कार्यकाळास जवळपास २५० वर्ष झाले. याचा अर्थ हि विहीर व बांधकाम २५० वर्षापासून आहे. कडक उन्हाळ्यात ह्या विहिरीला भरपूर पाणी असते शिवाय इतक्या उंचावर, विहीरीला पाणी हा सुद्धा एक चमत्कारच वाटावा.
अहिल्याबाई होळकरांनी महाराष्ट्र, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेशांमधील अनेक तीर्थक्षेत्रांवर नदीकाठी प्रशस्त दगडी घाट, देखणी मंदिरे व यात्रेकरूंच्या सोयीसाठी पाणपोया व धर्मशाळा बांधल्या.जनतेच्या सोयीसाठी त्यांनी बांधकामे केली आहेत.


बारव संवर्धन   ध्येय आणि दृष्टी :
      बारव हे केवळ जलस्रोत नसून, आपल्या ऐतिहासिक वारशाचे प्रतीक आहेत. अनेक शतकांपासून ही परंपरा आपल्या समाजात अस्तित्वात आहे, मात्र दुर्दैवाने काळाच्या ओघात हा समृद्ध वारसा दुर्लक्षित राहिला आहे. या बारवांमध्ये स्थापत्यकला, शिल्पकला, भक्तीची अभिव्यक्ती आणि सांस्कृतिक परंपरेचा अमूल्य ठेवा दडलेला आहे, जो जतन करण्याची आज नितांत गरज आहे.
     बारवांचे संवर्धन केल्यास पर्यटनाला चालना मिळू शकते. हे बारव सौंदर्यदृष्ट्या आकर्षक ठिकाणे ठरू शकतात, ज्यामुळे परिसराच्या सौंदर्यात भर पडते आणि स्थानिक समुदायासाठी एकत्र येण्यासाठी सार्वजनिक जागा उपलब्ध होते. विविध सण-उत्सव, धार्मिक समारंभ किंवा सांस्कृतिक कार्यक्रम यांच्या निमित्ताने समाजात एकात्मता वाढू शकते.
      यासोबतच, या उपक्रमांमधून स्थानिक पातळीवर रोजगार निर्मिती देखील शक्य आहे. जसे की देखभाल, मार्गदर्शन, पर्यटन व्यवस्थापन, हस्तकला विक्री इत्यादी. त्यामुळे बारवांचे जतन हे केवळ सांस्कृतिक दृष्टीने नव्हे, तर सामाजिक आणि आर्थिकदृष्ट्याही अत्यंत महत्त्वाचे आहे.
या प्रकारांमधून बारवांची उपयोगिता, सौंदर्यदृष्टी आणि स्थापत्यशास्त्रातील विविधता लक्षात येते. महाराष्ट्रात बारव पुनरुज्जीवनाची आवश्यकता –
       महाराष्ट्रात बारवांची संख्या अंदाजे २० हजाराच्या जवळपास आढळून येते. महाराष्ट्रातील अस्तित्वात असलेल्या पारंपरिक बारवा आजच्या काळात जलसंवर्धनासाठी एक समर्थ आणि शाश्वत पर्याय ठरू शकतात. अनेक भागांमध्ये असे बारव आढळतात की, जिथे ९० ते ९५ टक्के वर्षभर पाणी टिकून राहते. बारव पूर्वीच्या काळी गावांतील प्रमुख जलस्रोत होते. मात्र आजच्या वाढत्या लोकसंख्येच्या गरजा, शहरीकरण आणि जलवायू बदल यांच्या पार्श्वभूमीवर, तत्कालीन पाण्याची गरज आणि सध्याची वाढलेली गरज यामधील तफावत भरून काढण्यासाठी या पारंपरिक बारवांचे भूजल पुनर्भरणासाठी पुनरुज्जीवन करणे आवश्यक ठरते.
      या प्रक्रियेतून जर स्थानिक जलस्रोतांचा वापर वाढवला गेला, तर पाणीपुरवठ्याच्या योजना अधिक सुलभ, कमी खर्चिक आणि टिकाऊ ठरतील. जलस्रोतांचे स्थानिक पातळीवरील व्यवस्थापन हे पाणी टंचाईच्या प्रश्नावर प्रभावी उत्तर ठरू शकते. त्यामुळे बारवांचे संवर्धन व पुनरुज्जीवन हे महाराष्ट्राच्या जलनीतीचा एक महत्त्वाचा भाग व्हायला हवा.

      बारव पुनरुज्जीवनाच्या प्रक्रियेमुळे केवळ पारंपरिक जलस्रोतांचे संवर्धन होत नाही, तर त्याचे अनेक अतिरिक्त फायदे ही मिळतात. सर्वप्रथम, या उपक्रमामुळे उथळ जलधारांचा (shallow aquifer) वापर वाढतो, ज्यामुळे भूजल पातळी स्थिर राहते आणि नैसर्गिक जलचक्राला चालना मिळते. परिणामी, खोल विंधन विहिरींवर (borewells) अवलंबन कमी होते, जे केवळ खर्चिकच नाही तर भूजलाचे अतिनिकर्षण देखील घडवतात.
      या बारवांमध्ये नैसर्गिकरीत्या प्रदूषणविरहीत, स्वच्छ आणि निरोगी पाणी उपलब्ध होते. त्यामुळे पाणी शुद्धीकरणासाठी रासायनिक प्रक्रियांचा वापर कमी होतो, जो अनेक वेळा आरोग्यास अपायकारक ठरतो. याशिवाय, बारवांमधील पाण्याचा वापर केल्याने पाणीपुरवठा योजनांवरील खर्चात लक्षणीय बचत होते, कारण स्थानिक स्रोत वापरल्याने वाहतूक, शुद्धीकरण आणि वितरण यावरचा खर्च कमी होतो.
महत्त्वाचे म्हणजे, बारव पुनरुज्जीवनाच्या माध्यमातून जनजागृतीस चालना मिळते. लोकांना आपल्या जलसंपत्तीविषयीची जाणीव होते आणि ते या कार्यात सक्रिय सहभाग घेऊ लागतात. परिणामी, पाण्याच्या जतनासाठी आणि संवर्धनासाठी समाजाभिमुख प्रयत्न शक्य होतात, जे दीर्घकालीन जलसुरक्षेसाठी अत्यंत उपयुक्त ठरतात.
    महाराष्ट्रात नोंद घेतल्या गेलेल्या, नकाशावर स्थान निश्‍चिती झालेल्या दोन हजार बारवा आहेत. रोहन काळे या तरुणाने राज्यभर फिरून बारवांच्या नकाशीकरणाचे फार मोलाचे काम केले आहे. ‘महाराष्ट्र बारव मोहीम’ ग्रामीण भागातील निष्ठावान कार्यकर्त्यांच्या बळावर चालवली जात आहे. या मोहिमेत नोंदवल्या गेलेल्या बारवांपैकी जवळपास १०० बारवा वास्तुशास्त्र, रचना, सौंदर्य उपयुक्तता या सर्वच अर्थाने पर्यटन स्थळ बनू शकतील. या बारवांचे पाणी पिण्यासाठी वापरता येऊ शकेल, इतके चांगले आहे. ग्रामीण भागात पिण्याचे पाणी ही मोठी समस्या असते, या पाण्याचा उपसा झाल्यास हा प्रश्न सुटण्यास मदत होऊ शकते. यातील ७५ बारवा ‘आझादी का अमृत महोत्सव’ अंतर्गत निवडण्यात येणार असून, सर्वच परिसर विकसित करण्याची योजना आहे. प्राचीन बारवा मंदिर परिसरात असतील, तर तो परिसर या निमित्ताने स्वच्छ होऊ शकतो. तेथे बाग फुलवली, तर त्याचा उपयोग लहान-थोरांना होऊ शकतो. याच पाण्याचा वापर करून, परिसरात मोठी झाडेही वाढवता येऊ शकतात.
भारतात पाण्याचे इकोसिस्टीम असले तरी गेल्या काही काळात ज्या पद्धतीने पाण्याचे दुर्भिक्ष निर्माण होत आहे, त्यावरून आपल्या पूर्वजांनी शोधलेल्या जलपुरवठा पद्धतीचे पुनर्जीवन करण्याची गरज निर्माण झाली आहे. होय, कधी काळी 'बारवांचा महाराष्ट्र' अशी ओळख असलेल्या महाराष्ट्रातील बारव मृत स्थितीत असल्याने जलव्यवस्थापन अन् स्थापत्यशास्त्राचा हा अद्भूत नमुना जमीनदोस्त आहे. सध्या या बारवांचा श्वास मोकळा करण्यासाठी राज्यातील तरुणांकडून 'महाराष्ट्र बारव मोहीम' राबविली जात असून, आतापर्यंत 1800 पेक्षा अधिक बारवांचा शोध घेण्यात त्यांना यश आले आहे.
बारव आणि पुष्करणी पाणीटंचाईच्या प्रश्नावर उत्तर ठरू शकतात, हा विचार समोर ठेवून राज्यातील बारवांचा शोध घेऊन त्यांना पुनर्जीवन करण्यासाठी या मोहिमेच्या माध्यमातून प्रयत्न केले जात आहेत. आज आपल्या घराघरांत नळ असल्याने बारवांकडे दुर्लक्ष केले जात आहे. मात्र, आपल्या पूर्वजांनी खूपच विचारपूर्वक भूजलाच्या जिवंत स्रोतांवर बारव बांधल्या आहेत. सध्या या बारव गाळाने भरलेल्या, ढासळलेल्या असल्याने, त्यांचे पुनर्जीवन करण्याची गरज आहे. जलतज्ज्ञांच्या मते, जर बारवांच्या आजूबाजूला रेनवॉटर हार्वेस्टिंग केले, तर सतत पाणीपुरवठा उपलब्ध होऊ शकतो. विशेषत: मराठवाडा आणि विदर्भ या दुष्काळी भागांत बारव जलव्यवस्थापनासाठी आजही प्रभावी ठरू शकतात. भूमीअंतर्गत जलस्त्रोतांचा अचूक अंदाज घेत बांधलेल्या या बारव नुसत्या स्थापत्यशास्त्रातील प्रगतीची उदाहरणे नव्हेत, तर भूजलशास्त्रातील प्रगतीचीही चिन्हे आहेत. चांद बावडी, राणी की बाव अशा काही बारव जागतिक वारशात नोंदवल्या गेल्या आहेत. महाराष्ट्रात सहाव्या शतकापासून बारवांची बांधकामे वाढत गेली. यादवकाळात मोठ्या प्रमाणात बारवा बांधल्या गेल्या. ब्रिटिशकाळात मात्र ही परंपरा खंडित झाली, ती आजतागायत कायम आहे. मात्र, ज्या बारव बांधल्या गेल्या त्यांचे पुनर्जीवन केल्यास, महाराष्ट्रातील पाणीप्रश्न मार्गी लागण्यास मदत होईल. त्याकरिता शासनाच्या पुढाकाराची गरज असल्याचे इतिहासप्रेमी सांगतात.
35,000 बारव पुणे-सोलापुरात – ब्रिटिशांनी केलेल्या नोंदीनुसार पुणे जिल्ह्यात 35 हजारांपेक्षा अधिक बारव आहेत. पाठोपाठ सोलापूर जिल्ह्यात 35 हजारांच्या आसपास बारवांची नोंद आहे. ही संख्या ब्रिटिशांनी गॅझिटियरमध्ये पायविहिरी या नावाने नोंदवून ठेवली असल्याचे आढळून येत असले तरी, या बारवांचा शोध लागल्यानंतरच खरा आकडा स्पष्ट होऊ शकेल.

महाराष्ट्रातील आतापर्यंत शोधलेल्या बारव –
पश्चिम महाराष्ट्र – 398
दक्षिण महाराष्ट्र – 357
कोकण – 360
मराठवाडा – 306
पश्चिम विदर्भ – 228
उत्तर महाराष्ट्र – 155
(ही संख्या 1650 इतकी असून, सद्यस्थितीत ती 1800 पर्यंत पोहोचली आहे. यात आणखी भर पडण्याची शक्यता आहे.)

पर्यटनासाठी महत्त्व – 
* धुळ्यातील अहिल्यापूर बारव स्थापत्य कलेसाठी प्रसिद्ध
* परभणीसाठी वालूर बारवचा आकार आकाशगंगेसारखा असून, जगात अशा आकाराची बारव कुठेही नाही. तर पिंगळी येथील बारव पुष्करणी आकाराची आहे.
* पुणे, आंबेगाव, मंचर येथील बारव कुंडाच्या आकाराची आहे.
* औरंगाबाद, शेकटा येथील बारव सुस्थितीत असून, वास्तू स्थापत्य कलेचा सुंदर नुमना आहे.
* अमरावती येथील बारवच्या पाचमजली पायर्‍या खाली उतरत जावे लागते.
* अहमदनगर येथील हत्ती बारवच्या पायर्‍या आकाराने मोठ्या असून, याठिकाणी हत्ती पाणी पिण्यासाठी खाली उतरत असल्याचे बोलले जाते.

 बावखळ - वसई तालुक्यातील प्राचीन जलव्यवस्थापन पद्धती

वसई विरार हा पूर्वीपासूनच  हरित पट्टा म्हणून ओळखला जातो . सोनचाफा , तगर आणि इतर फुलशेती, केळी आणि नारळीच्या बागा, आणि इतर भाजीपाला ह्या पट्टयात अगदी विपुल प्रमाणात पिकतो .  पूर्वेला जिवदानीचा आणि बारोंडा देवीचा डोंगर, पश्चिमेला पंचवीसेक किलोमीटरचा समुद्र किनारा, उत्तरेला वैतरणेची खाडी आणि दक्षिणेला उल्हासची (वसईची) खाडी अशा भौगोलिक रचनेत वसलेला हा प्रदेश ! समुद्र आणि खाड्यांमधलं खारट पाणी  सिंचनासाठी वापराला सोयीस्कर नव्हतं . पावसाचं पडलेलं पाणी समुद्र जवळ असल्यामुळे अगदी सहज समुद्रात वाहून जात असे . आणि म्हणूनच सिंचनासाठी बावखळांची निर्मिती झाली .

बावखळ

बाव म्हणजे विहीर आणि खळ म्हणजे खडडा ! म्हणजेच पाणी साठवण्यासाठी विहीरी सारखा गोल खोलाकार खड्डा म्हणजे बावखळ .पण मग त्याला विहीरच का नाही म्हणत हे समजण्यासाठी आपल्याला बावखळांची रचना नीट समजून घ्यावी लागेल .

 चित्र क्र. १ . बावखळांची रचना आणि वैशिष्ट्ये .

चित्र क्रमांक एक मध्ये दाखवल्याप्रमाणे तळाशी बेसॉल्ट खडक सापडतो .बेसॉल्ट खडक हा भुजलधारक आहे . भुसभुशीत कडा ह्या नैसर्गिक उतारावरून  येणाऱ्या पाण्याला आत मध्ये झिरपण्यासाठी मदत करतात . बावखळ गोलाकार किंवा चौकोनी असतं . त्याचा व्यास विहीरी इतका किंवा त्यापेक्षा मोठाही असतो . आजूबाजूला चिंच आंबा अशा गर्द वृक्षांची लागवड करतात जेणेकरून सावलीमुळे पाण्याचे बाष्पीभवन कमी होतं . त्याच सोबत या पानांचा खच पाण्याच्या पृष्ठभागावर तरंगतो आणि बाष्पीभवन कमी करतो . भेंड आणि करंज यासारख्या झुडप वर्गीय वनस्पती माती घट्ट धरून ठेवतात जेणेकरून पाण्यासोबत माती बावखळाच्या आत जाणार नाही . ( माहिती सौजन्य : श्री सचिन मर्ती . )
विहीरीशी तुलना केल्यास विहीर ही गोलाकार असते आणि तिचा व्यास कमी असतो . विहीरीच्या कडा दगड विटांनी पक्क्या बांधलेल्या असतात . पावसाचं पाणी  विहीरीत झिरपावं अशी अपेक्षा नसते . उलट तळाशी असलेले नैसर्गिक झरे पाण्याची पातळी ठरवतात . पाणी पिण्यासाठी वापरतात त्यामुळे आजूबाजूला झाडांची लागवड करत नाहीत . कारण झाडांची पानं पाण्यात पडून पाण्याची गुणवत्ता खराब होते .
चित्र क्र . २ .बावखळ, सभोवतालची झाडं, मध्यभागी रहाटाची सुविधा .

चित्र क्र . ३ . बावखळा भोवतीची सावली साठी लावलेली झाडं .


चित्र क्र . ४ . बावखळाभोवतीची झुडूपं

स्वातंत्र्यपूर्व परिस्थिती : -

स्वातंत्र्य पूर्व काळात अनेक कुटूंबांचं मिळून एक बावखळ असे . प्रत्येक कुटूंब त्याचा आलटून पालटून वापर करत असे . बैलजोडी आणि रहाटाचा वापर पाणी उपसण्यासाठी केला जाई . रहाटाला मातीची मडकी जोडली जात , आणि त्यांची रचना अशी असायची की त्यातून थोडंसं पाणी पुन्हा बावखळात परत जाई . तसंच बैलजोडी वापरल्याने बैलांच्या क्षमतेनुसार पाणी उपसा होत असे . दिवसातून ८ तास काम केल्यावर बैलांनाही आराम दिला जाई . त्यामुळे पाणी उपसा नियंत्रित प्रमाणात होई आणि खाली गेलेली पाण्याची पातळी उरलेल्या सोळा तासांच्या कालावधीत पूर्ववत होत असे .  बाहेर पडलेलं पाणी लहान चर खोदून शेतांपर्यंत पोहोचवलं जाई .

 सध्याची परिस्थिती : -

गेल्या पंचावीसेक वर्षांत वसई विरार नगरपालिका आणि आजच्या घडीला महानगरपालिकेने बरीच धरणं बांधली आणि घरोघरी नळाने पाणी पुरवठ्याची सोय केली . तसंच ह्या भागात झालेल्या आर्थिक आणि सामाजिक सुधारणांमुळे इथल्या तरुणाईला परदेश आणि तिथलं जीवनमान आकर्षित करू लागलं. त्यामुळे पारंपारिक शेती व्यवसायाकडे दुर्लक्ष होऊ लागलं . जमिनींना सोन्याचे भाव आले आणि बावखळ जमिनीचा बराचसा भाग व्यापत असल्यामुळे त्यांना बुजवून नवीन इमारती आणि नवीन घर बांधण्याकडे लोकांचा कल वाढला .
 औद्योगिकरण आणि यांत्रिकीकरणामुळे बैलांची जागा मोटरनी घेतली . त्यामुळे दिवसाच्या कोणत्या वेळेत आणि किती पाणी उपसा करायचा यावर बंधन उरलं नाही . परिणामी जवळ असलेल्या समुद्राचं खारट पाणी बावखळात जमिनी खालच्या झऱ्यांमधून शिरू लागलं. पाण्याची आणि जमिनीची गुणवत्ता बिघडली . काही बावखळं तर आज बेवारस पणे पडून आहेत . त्यांत कचरा घाणीचं साम्राज्य आहे . फक्त काहीच बावखळं अशी आहेत ज्यांचा आजही सिंचना साठी वापर होतो . ती बर्‍यापैकी सुस्थितीत आहेत ( चित्र क्रं. २, ३, ४ ) .

चित्र क्र. ५ . बावखळांची दुर्दशा .

कोकणातील बारवा :-

 सध्याचा पालघर,ठाणे म्हणजे उत्तर कोकण ते रायगड, रत्नागिरी आणि तळकोकण सिंधुदुर्ग जिल्हा अश्या पसरलेल्या कोकण पट्टीत बर्याच विहीरी, बारवा आणि तलाव असले तरी मोजक्याच वास्तुविशेषांची आपण माहिती घेणार आहोत.
 देवळोली ( बदलापूर ) येथील चावीच्या आकाराची विहीर :-
 इतिहासाच्या शेकडो खाणाखुणा आपल्या आजूबाजूला पाहायला मिळतात. बदलापूर  शहराला तर इतिहासाचा वारसाच लाभलेला आहे. अनेक प्राचीन वास्तूंचे  नमुने बदलापुरात आढळतात. त्यातील देवळोली गावातील  चावीच्या आकारातील  प्राचीन विहीर पर्यटकांना आकर्षण आहे . ही विहीर पेशवेकालीन असावी. तिचे पाणी दुष्काळातही आटत नाही, असे येथील गावकरी सांगतात. 
नवगाव
स्थळ - मुरबाड कडे जाताना गोवेली च्या पुढील गाव
गावं - नवगाव
 बापसाई
स्थळ - मुरबाड कडे जाताना नवगावच्या समोरील गाव 
गावं - बापसाई
केळणी
स्थळ - मुरबाड कडे जाताना उजव्या हाती असलेले अळणी गाव
गावं - केळणी
कुडावे

स्थळ - पनवेल वरुन कर्नाळ्याकडे जाताना उजव्या बाजूस
गावं - पळसपे
भाटण
स्थळ - पनवेल वरुन कर्जतला जाताना उजव्या हातास
गावं - भामण
भोकरपाडा
स्थळ - पनवेल वरुन कर्जतला जाताना उजव्या हातास
गावं - भोकारपाडा
तुपगाव
स्थळ - पनवेल वरुण कर्जतला जाताना उजव्या हातास
गावं - तुपगाव
 
 
 
 
 
 
Key shape well
बदलापूर पश्चिम शहरी भागापासून सुमारे सहा किलोमीटर अंतरावर देवळोली हे गाव आहे. सुमारे ६० घरे असणारे हे गाव ऐतिहासिक प्राचीन शिल्पांनी नटलेले आहे. या ठिकाणी सगळ्यात आकर्षण असणारी वास्तू म्हणजे प्राचीन अशा काळ्या कातळातील चावीच्या आकारातील विहीर. ही विहीर सोळाव्या शतकात उभारलेली असावी, असे येथील जुने जाणकार सांगतात. फक्त काळ्या कातळांचा वापर करून चावीच्या आकाराची ही विहीर बांधण्यात आली आहे. कातळावर कातळ रचून, चुना किंवा इतर कशाचाही वापर न करता ही विहीर बांधण्यात आली आहे. विहिरीत उतरण्यासाठी कातळाच्या पायऱ्या देखील बांधण्यात आल्या आहेत.
 

 
 साधारण ७० ते ७२ फूट खोली असलेल्या या विहिरीवर मध्यभागी गणपतीचे शिल्प कोरलेले आहे. कडेच्या भिंतीवर हत्तींचे शिल्प कोरण्यात आले आहे. या विहिरीचे वैशिष्ट्य म्हणजे या विहिरीचे पाणी कधीच आटत नाही, अगदी दुष्काळसदृश परिस्थिती झाली तरीही हे पाणी आटत नसल्याचे येथील गावकरी सांगतात. तसेच गावात नळ योजना येण्यापूर्वी याच विहिरीतील पाणी गावकरी वापरत होते. वातावरणात कितीही उष्णता असली तरी, या विहिरीतील पाणी मात्र गारच असल्याचे गावकरी सांगतात. आधी या विहीरीच्या परिसरात तण, झाडी माजली होती. आता मात्र संवर्धन कार्य करुन आजुबाजुचा परिसर नीटनेटका केलेला आहे.


 
 
शिवकाळात कोकण व घाटमाथ्यावर जाण्यासाठी बदलापूर हे ठिकाण मध्यवर्ती होते. त्यावेळी घोडेस्वार घोडे बदलण्यासाठी या ठिकाणी येत होते व विश्रांती घेऊन पुढच्या प्रवासाला निघायचे, अशी महती आहे. त्याच वेळी ही विहीर बांधण्यात आल्याचे ग्रामस्थ सांगतात.

 सप्तेश्वर :-

कोकण म्हणजे अलिबाबाची गुहा आहे. इतका खजिना इथे दडलेला आहे की, शोधून शोधून दमायला होईल. एखादा परिसर सगळा बघून झालाय असं वाटेपर्यंत तिथलं काही तरी सुंदर आपल्यासमोर येऊन उभं रहातं आणि हे आधी कसं बघितलं नाही असं वाटून जातं. संगमेश्वरजवळचं सप्तेश्वरही अशाच सुंदर ठिकाणांपैकी एक. अनेकदा संगमेश्वर फिरलेल्यांनाही हे ठिकाण माहीत नसतं. प्राचीन जलव्यवस्थापनाचं उत्तम उदाहरण इथे दिसतं.

     मुंबई-गोवा महामार्गावर शास्त्री नदीवरील पूल ओलांडून आपण संगमेश्वरकडे जातो. डावीकडे रस्ता कसबा संगमेश्वरला जातो. तिकडे न वळता संगमेश्वरकडे जायचे. जरा पुढे गेल्यावर उजवीकडे मुळ्ये हॉस्पिटल आहे आणि त्याच्याच समोर डोंगरावर रस्ता चढलेला दिसतो. चांगला डांबरी सडक आहे. त्या रस्त्याला चांगलाच चढ आहे. डोंगरावर चढणारा रस्ता सागाच्या जंगलातून जातो. अंदाजे ३ कि.मी. गेल्यावर ओढय़ावरील पुलावर रस्त्याला दोन फाटे फुटतात. उजवीकडे ऐन गर्द झाडीत आहे सप्तेश्वर महादेवाचे मंदिर.
     डावीकडचा रस्ता देवपाट वस्तीकडे जातो. काही अंतर चालत गेल्यावर भक्कम बांधणीचे मंदिर दिसते. मंदिराच्या बाजूनेच पाण्याचा प्रवाह वाहतो आहे. मंदिराच्या प्राकाराला भिंत बांधून बंदिस्त केलेले आहे. जसे आपण प्रांगणात प्रवेश करतो आपल्यासमोर इथला खजिना उघडलेला दिसतो. आपल्यासमोर एक पाण्याचे कुंड दिसते. त्याच्या मागे अजून एक कुंड आहे आणि त्याच्या मागे चिऱ्याच्या दगडातले सुंदर बांधकाम नजर खिळवून ठेवते. दोन बाजूंना खोलीसारखे बांधकाम आणि मधल्या बांधकामाला ५ खिडक्या. या बांधकामात चुन्याचा वापर केलेला आहे. चुन्याच्या घाणीचे दगडी चाक आजही तिथे दिसते. अलकनंदा नदीचा उगम इथेच डोंगरावर होतो. त्याचे खाली येणारे पाणी इथे सात प्रवाहांत विभागून ते परत मोठय़ा कुंडात सोडले जाते. सात प्रवाहांचा स्वामी तो ‘सप्तेश्वर’ अशी साधी सोपी व्याख्या. बाजूच्या दोन खोल्यांचे प्रयोजन समजत नाही. त्यांच्या डोक्यावर शिखरासारखे साधे बांधकाम केलेले आहे; पण याच्या पाठीमागे जाऊन पाहिले तर डोंगरावरून आलेला प्रवाह विशिष्ट चॅनेलमधून आणला आहे. प्रत्येक खिडकीपाशी त्याला ‘टी सेक्शन’सारखे बांधकाम करून प्रवाहित केलेला आहे. जिथे तो जोडलेला आहे तिथे एक चौकोनी खड्डा केलेला आहे. अतिशय सुबक आणि उत्तम तंत्रज्ञान वापरून हे जलव्यवस्थापन केलेलं दिसतं. या सर्व सातही खिडक्या आतून एकमेकांना सलग जोडलेल्या आहेत. त्यांच्या कमानी एका रेषेत सरळ दिसतात. या सगळ्या स्थापत्यावर इस्लामिक स्थापत्य कलेचा प्रभाव प्रकर्षांने जाणवतो. मध्ययुगीन काळात हे जलव्यवस्थापन केलेलं आहे. शिवाय हे सगळं बांधकाम देखणंसुद्धा आहे. समोरच्या बाजूला प्रत्येक खिडकीच्या वर व्यालासारखा एक काल्पनिक पशू कोरलेला दिसतो. त्याशिवाय पानाफुलांची सजावट केलेली दिसते. बाजूला आणि डोक्यावर लहान-लहान कोनाडे आहेत. कदाचित तिथे उजेडासाठी पणत्या ठेवत असावेत. या सातही विभागांतून वाहणारे सगळे प्रवाह पुढच्या बाजूला एकत्र येऊन एका गोमुखातून मोठय़ा कुंडात पडतात. ३० फूट लांबी रुंदीच्या कुंडात आत उतरायला पायऱ्या केलेल्या आहेत. स्वच्छ आणि निवळशंख असे हे पाणी इथून जमिनीखालून दुसऱ्या कुंडात जाते आणि ते कुंड भरले की तिथून पुढे एका ओढय़ाला जाऊन मिळते. हाच ओढा पुढे गावात जातो.
निसर्गाचा वरदहस्त लाभलेले हे नितांत रमणीय ठिकाण संगमेश्वराच्या डोंगरावर ऐन झाडीत दडलेले आहे. इतक्या उंचावर मुद्दाम केलेले प्राचीन जलव्यवस्थापन आणि या रमणीय परिसरात मिळणारी शांततेची अनुभूती घेण्यासाठी कोकणात दडलेला हा खजिना आवर्जून पाहायला हवा.

 रानवडी बारव –

रायगड जिल्ह्यातील महाड तालुक्यातील रानवडी गावाजवळील ऐतिहासिक बारव (पायऱ्यांची विहीर) हा कोकणातील एक महत्त्वपूर्ण जलसंपत्तीचा वारसा आहे.  ही बारव म्हणजेच एक खोल विहीर असून, ती ऐतिहासिक काळात पिण्याच्या पाण्याच्या गरजांसाठी आणि जलसंधारणासाठी वापरली जात होती.हि बारव रानवडी, महाड तालुका, रायगड जिल्हा,इथे असून रानवडी गाव महाडपासून अंतर: सुमारे २५-३० किमी वर आहे.महाड शहरातून रानवडी गावाकडे जाण्यासाठी स्थानिक बस सेवा किंवा खासगी वाहनाचा वापर करता येतो.

 

  

 
 
 
 या बारवेत पाण्यापर्यंत पोहोचण्यासाठी पायऱ्यांची रचना आहे, जी त्या काळातील जलव्यवस्थापनाचे उत्कृष्ट उदाहरण आहे.या बारवेतून स्थानिक ग्रामस्थांनी पाणीपुरवठा केला जात असे, तसेच हे ठिकाण सामाजिक आणि धार्मिक कार्यक्रमांसाठी वापरले जात असे.
 एल. एस. रहेजा कॉलेज ऑफ आर्किटेक्चरच्या विद्यार्थ्यांनी या बारवाचे आधुनिक पद्धतीने दस्तऐवजीकरण केले आहे, ज्यात बारवाची लांबी, रुंदी, खोली, बांधकामाची रचना आणि शिलालेख यांचा समावेश आहे.
खानदेशातील जलसंस्कृती

असिक, ऋषीक, स्कंधदेश, खांडवदेश, कान्हदेश, दानदेश, डांगदेश, तानदेश अशी कधीकाळी विविध नावे असलेला आणि ज्याचा विस्तार उत्तरेला सातपुडा, दक्षिणेस सातमाळा, चांदोर, अजिंठा डोंगररांगांपर्यंत, पूर्वेला हाती टेकड्या तर पश्चिमेस सह्याद्री डोंगररांगांपर्यंत असलेला हा खानदेश. वाघुर काठच्या अजिंठ्याच्या रॉबर्ट – पारो व डोंगरी-तित्तूर काठच्या चाळीसगावच्या केकी मूस यांची अजरामर प्रेम कहाणी देणारा खानदेश.
  भारतीय संस्कृती हि पंचमहाभूतांना म्हणजेच जल, वायू, आकाश,पृथ्वी व अग्नी यांना महत्व देणारी संस्कृती आहे. याच संस्कृतीत आदिम कालखंडात म्हणजेच सिंधू संस्कृतीत देखील निसर्गदेवतांचीच पूजा व्हायची ज्यात प्रामुख्याने जलदेवतांची पूजा व्हायची असे अनेक पुरावे आता उपलब्ध झालेले आहेत. प्राचीन भारतीय साहित्यापैकी एक असलेल्या अथर्ववेदात उल्लेख येतो की – ज्याप्रमाणे गाई मागे वासरू त्याप्रमाणे नदी मागे कालवा आवश्यक आहे. तसेच ऋग्वेदातहि शेतीसाठी पाण्याचा वापर कसा करावा, पाणी उपसा कसा करावा याचे दाखले दिलेले आहेत.
खानदेशात उपलब्ध झालेल्या आत्तापर्यंतच्या सर्व पुरातत्वीय अवशेषांवरून तापी व गिरणा हे दोन खानदेशच्या जलसंस्कृतीचे मुख्य प्रवाह असून प्रकाशा, सावळदा, बहाळ-टेकवाडे, पाटणे-पाटणादेवी, चित्तेगाव-मानेगाव तसेच धुळे जिल्ह्यातील शेकडो पुरातत्वीय स्थळांवरून या प्रदेशातील जलसंस्कृतीची मुळे शोधणे शक्य झाले आहे. खानदेशातील तापी आणि गोमई नदीच्या काठावर प्रकाशा येथे भारतातील पहिली शेती झाली तसेच डोंगरी नदीच्या काठावर पाटणे जेथे धवलतीर्थ सारखा अप्रतिम सुंदर असा जलप्रपात आहे (ता. चाळीसगाव) येथे प्रत्यक्ष वस्ती असलेले भारतातील सर्वात प्राचीन अश्मयुगीन वसाहत स्थळ १९७२ साली संशोधकांना प्राप्त झाले.२ याच पाटणे या ठिकाणी ४० ते ६० हजार वर्षा पूर्वीची शहामृगाच्या अंड्यावर केलेली कोरीव नक्षी, अंड्याचे मणी प्राप्त झाले जे मणी भारतातील दागिन्यांपैकी सर्वप्रथम होत.३ तसेच येथेच सापडलेले पाटा-वरवंटा व धान्याचे कण यावरून प्राचीन मानवाचा धान्य बारीक करून खाण्याचा प्रथम पुरावा म्हणता येईल. इ.स. पूर्व १८०० ते १६०० पूर्वीच्या उत्तर हडप्पा संस्कृतीच्या समकालीन असलेल्या मानवाने पाटणेच्या महादेव मंदिरा पासून जवळच असलेल्या आड नामक नाल्याकाठी एक गांव वसविले.

याच परिसरातील गिरणा-बहुळा नदीच्या काठावरील बहाळला सापडलेल्या आहत (पंचमार्क्ड) नाण्यांवरून या भागावर इ.स. पूर्व चौथे शतक ते दुसरे शतक या काळात मौर्यांचे राज्य होते. नंतर सातवाहन राजांच्या काळात उत्तरेकडून अंबा गाव व तेथून पितळखो-याच्या रस्त्यावर हंकारी नावाचे मातीचा कोट असलेले गाव वसविले होते. अजिंठ्यातील शिलालेखानुसार पुढे येथे वाकाटकानी येथे राज्य केले.
उपरोक्त सर्व माहितीवरून हे सिद्ध होते की पूर्व खानदेशचे गिरणा-बहुळा-डोंगरी-तित्तूर नद्यांचे खोरे हा एक समृद्ध आर्थिकदृष्ट्या संपन्न जलसंस्कृतीचा प्रदेश होता.
पूर्व खानदेश व पश्चिम खानदेशला जोडणारा एक महत्वाचा दुवा म्हणजे तापी नदी. पश्चिमेकडून पूर्वेकडे वाहणाऱ्या या तापी नदीला खानदेशात लहान मोठया १३ नद्या व असंख्य ओढे मिळतात तसेच खानदेशचा बहुतांश भूभाग हा तापीच्या दक्षिणेला वसलेला आहे. नंदुरबार जिल्ह्याच्या एका टोकावरून नर्मदेचा प्रवाह खळाळतो तर मध्यातून तापी वाहते. या तापी-बोरी-बुराई नदीच्या काठांवर प्रकाशा-कवठे-मेथी-शिंदखेडे अशी असंख्य प्राचीन स्थळे वसलेली आहेत. या पैकी प्रकाशा-सावळदा हे भारतातील अत्यंत महत्वाचे पुर्तात्वीय स्थळ आहे कारण या ठिकाणी ४ विविध संस्कृतींचे असंख्य अवशेष प्राप्त झालेले आहेत. भारतात जेथे जेथे अत्यंत समृद्ध जलसंस्कृतीची स्थळे होती तेथेच कुंभमेळ्यांची परंपरा सुरुवात झाली व ती कायम राहिली. तापी नदीच्या काठावरील प्रकाश येथेही हि परंपरा कायम राहिलेली दिसते. ज्याप्रमाणे पश्चिम खानदेशात तापी-बोरी-बुराई नदीच्या काठांवर शेकडो पुरात्वीय स्थळे प्राप्त झालेली आहेत .त्याच प्रमाणे पूर्व खानदेशातहि याच तापी-पूर्णेच्या संगमावर चांगदेव जवळ चितेगाव, मानेगाव येथे आद्य पुराश्मयुगीन वसाहतीचे दीड ते एक लाख वर्षा पूर्वीचे अवशेष प्राप्त झालेले आहेत.
तापीचे मूळ नाव बदरी व पुर्णेचे पयोष्णी असे होते. या दोन्ही नद्यांच्या संगमाजवळच असलेल्या मेहूण या गावातील अभिलेखातून जळगाव जिल्ह्याचे वैशिष्ट्य म्हणता येईल अशी एक माहिती मिळते. चालुक्य विक्रमादित्याचा मांडलिक हैहय वंशीय (कलचुरी) राजा प्रतिकंट व त्याच्या मुलाचा शुभंकंटचा खानदेशातील एकमेव असे सूर्य मंदिर येथे उभारल्याच्या संदर्भात उल्लेख मेहूण अभिलेखात येतो.
यावरून आपणाला असे म्हणता येईल की तापी-पूर्णा काठावरील हि सर्व स्थाने तत्कालीन कालखंडात ज्ञानसाधनेने संपन्न होती.
दुसरा फारुकी सुलतान नसीर खान (इ.स. १३९९-१४३७) याने असिरगडावरून हस्तगत केलेल्या संपत्तीतून तत्कालीन खानदेशच्या तापीकाठावर इ.स. १४०० मध्ये आपल्या राजधानीचे नवीन शहर बांधले व त्यास बुऱ्हाणपूर हे नाव दिले. या शहरात त्यावेळी २ लाख ३५ हजार व्यक्तींना पुरेल अशी १ कोटी लिटर पाणी मिळण्यासाठीची पाणीपुरवठा योजना पद्धती इ.स. १६१५ मध्ये अमलात आणली गेली. जी आजही कसलाही एक रुपये लाईट बिल खर्च न येता चालू आहे. (केवळ योग्य देखभाल न केल्यामुळे व पाण्यात मिठाचा गुणधर्म जास्त असल्यामुळे आता ३० लाख लिटर पाणी या पद्धतीतून होतो.)

नंदुरबार जिल्ह्यातील पाण्याची उपलब्धी व जीवनमान याचे वर्णन करताना १३३५ ते १३६५ या कालखंडात खानदेशातून प्रवास करताना लिहितो – ‘इस छोटे से नगर के लोग कला-कौशल के द्वारा हि अपना निर्वाह करते है. इनमे से कोई कोई वैद्यक तथा ज्योतिष के भी अपूर्व ज्ञाता है. चावल, हरे शाक-पात और सरसों का तेल यहां के प्रधान खाद्यपदार्थ है. यहां मदिरापान दूषण समझा जाता है और कोई आदमी मद्यसेवन नही करता.
मध्ययुगाच्या उत्तरार्धात अबुल फझलच्या एन-इ-अकबरी (इ.स. १५७७) मध्ये, असलेल्या तबकात-ए-अकबरी (इ.स. १५९३) या हस्तलिखित ग्रंथात,१३ तारीख-ए-दख्खन (इ.स. १७२९) या ग्रंथातहि येथील जलसंस्कृतीची वर्णने आढळतात.१४ समकालीन हिंदुस्थानात अतिपवित्र मानलेल्या २८ नद्यांमध्ये अबुल फझलने तापी नदीचा समावेश केलेला आहे. तो लिहितो – ‘तापी नदी वऱ्हाड गोंडवनच्या दरम्यान उगम पावुन खानदेशातून वाहते आणि पूर्णा व गिरणा या तिच्या उपनद्या आहेत. येथील हवामान सुखद व हिवाळा आल्हाददायक आहे.  या लिखाणातून देखील तापीकाठच्या संपन्न खानदेशी लोकवसाहतीचे संदर्भ समोर येतात.
खानदेशच्या जलसंस्कृती व तिच्या परिसरातील जनजीवनाची अशीच वर्णने आदिल खान फारुकीच्या गुलशन – इ – इब्राहीमी, १६५६ ते १७१७ पर्यंत खानदेशात अनेक वेळेला फिरलेल्या निकोलाय मनुची,  व्हेनियर, टा̆मसरो, मा̆र्टीन, थेवेनॉट, बर्नियर व डेक्कन कॉलेज, पुणे येथील मराठा वस्तुसंग्रहालयात व पेशवे दफ्तर, पुणे येथे असलेल्या खानदेश जमाव रुमाल क्र. १२, ५७, ११३, ११५, ११८, १३३, १६८, १६९, १७०, १९९ व २१८ मध्ये येतात.
४ ते ७ ऑगस्ट १६८१ या ३ दिवसात पाँडेचेरी येथील फ्रेंच्यांच्या वखारीचा प्रमुख प्रासोन्क्षा मार्टिन याने खानदेशातून प्रवास केला ज्याचे त्याने आपल्या डायरीत फ्रेंच भाषेत वर्णन करून ठेवलेले आहे. त्यात तो म्हणतो – ४ ऑगस्ट रोजी आम्ही फर्दापूर येथे पोहचलो. अजिंठ्याचा मैल – दीड मैल घाट उतरत असताना पाहणाऱ्याला भोवतालचे दृश्य इतके सुंदर वाटते की, त्याचे वर्णन शब्दात करणे शक्य नाही. या प्रदेशातील सर्व भाग अतिशय सुपीक आहे आणि जेथे पहाल तेथे जमीन शेतीखाली आलेली दिसते. डोंगरातून उगम पावलेल्या नद्या (वाघूर इ.) या प्रदेशातून वाहत जातात. ह्या प्रदेशात जिकडे-तिकडे आंब्याच्या बागा व चिंचेची झाडे दिसतात. पुढे तो शेंदुर्णी, गिरणा नदी व तिचा भोवताल, एरंडोल व धरणगावच्या संपन्नतेचे वर्णन करतो.१६ वाघूर नदीकाठच्या जगप्रसिद्ध अजिंठा लेणी परिसराचे हे पहिलेच यथार्थ वर्णन ठरते. आजही येथील सप्तकुंड धबधब्यातून पडणारा वाघूरचा विलोभनीय प्रपात पाहताना १३९ वेळा अजिंठ्याला भेट देऊनही रॉबर्ट-पारो च्या प्रेमकथे प्रमाणे माझेही मन अतृप्त राहिल्या सारखे वाटते. परंतु मनाला हि मोठी खंतहि राहून जाते की मागच्या ५० वर्षात या परिसरातीलच मानवाने आपल्या कर्माने या जगप्रसिद्ध जागतिक वारसाचे प्रचंड नुकसान करून ठेवलेले आहे जि हानी आता कधीच भरून येऊ शकणार नाही.
एकूणच मुघल व मराठा कालीन सर्व दस्ताऐवजांमध्ये तापी व गिरणाकाठची जळगाव व भुसावळ याचे उल्लेख वगळून अमळनेर, बहाळ, भडगाव, पाचोरा, शेंदुर्णी, लोहारा, एरंडोल, धरणगाव, अडावद, चोपडा, डांभूर्णी, नशिराबाद, यावल, सावदा, न्हावी, चांगदेव, वरणगाव, बोदवड, एदलाबाद, अंतुर्ली, रावेर, बहाद्दरपूर, जामनेर, वाघळी, जामोद, जैनाबाद, नंदुरबार, देवपूर, धुळे, कवठे, साक्री, दोंडाइचा इ. स्थानाचे उल्लेख तेथील वनस्पती, प्राणी, पिके व सुपीक जमिनी इ. सह येतात. पुणे पुराभिलेखागारातील पत्रांवरून आपणास खानदेशातील पेशवे काळातील पाणीपुरवठा केंद्रांची म्हणजेच धरणे वा बंधारा-यांची माहिती मिळते. या काळात नेर, डोंगरी, जापी, निमखेड, भवाली, कुसुंबे, दहिवेल, पाटणे, बेटावद, पिंपळनेर, कासारे इ. गावांना पाटाद्वारे पाणी दिले जायचे. व त्यापैकी एका ठिकाणी या पाण्यावर जवळपास २७ बिघे जमिनीत १७८५-८६ मध्ये उसाची लागवड केल्याचे उल्लेख मिळतात.
आधुनिक काळातील खानदेशच्या जलसंस्कृतीवर वाईट परिणाम झाल्याचे आढळून येतात. एकेकाळी अतिशय संपन्न म्हणून ज्याचा उल्लेख झाला त्या नंदुरबारला मुंबई प्रांताचा गव्हर्नर माउंट स्टुवर्ट एल्फिन्स्टन याने ऑगस्ट १८१८ मध्ये भेट दिली तेंव्हा तो आपल्या डायरीत लिहतो की, ‘दक्षिण भारतात दयनीय कोणते शहर मला दिसले असेल तर ते नंदुरबार’.
१९२१ मध्ये खानदेशचा पहिला नकाशा तयार केला तो क̆प्टन जॉन ब्रिग्ज याने – आर्थर व्हाईट व जेम्स एव्हर्स यांच्या सहाय्याने. यावेळच्या सर्व्हेनुसार खानदेशात विहिरींची संख्या २७०३१ व बंधारा-यांची संख्या १४० इतकी होती. तसेच २१६८ चौरस मैल जंगल सरकारच्या ताब्यात होते. स्वातंत्र्योत्तर काळखंडात मात्र हरताळे, म्हसवे, वेल्हाळे, मेहरूण या जळगाव जिल्ह्यातील तलावांबद्दल बोलायचे तर ज्या मेहरुनच्या काठावर बहिणाबाई सारखी जीवनाचे तत्वज्ञान अत्यंत सोप्या शब्दात सांगणारी आधु महान कवयित्री राबली तो मेहरूण असो व इतरही तलाव या सर्वाकडे, जाणून बुजून दुर्लक्ष होत राहिले, इतरही धुळे नंदुरबार जिल्ह्यातील तलावाचे कित्येक वर्ष हीच स्थिती आहे.
परंतु आम्ही खानदेशच्या जलसंस्कृतीच्या उपासकाने कधीही हे विसरता कामा नये की खानदेशातील एकूण ग्रामनामांपैकी १३% वर गावांची नावे पाण्याशी संबधित आहेत.१८ उदा :-
पाणी :- अंबापाणी, गेरुपाणी, भांगरापाणी, मोगरापाणी, कुंड्यापाणी इ.
विहिरी :- अलविहीर, दगडीविहीर, खोलविहीर, वाव्याविहीर, धावळीविहीर इ.
कुवा :- अक्कलकुवा, मालकुवा, अमलकुवा, बोरीकुवा इ.
तळे :- निमतळे, तामतळे, खडतळे, तळेगाव इ.
कुंड :- बोरकुंड, बेडाकुंड, माकडकुंड इ.

दोधेश्वर  बारव :-

दोधेश्वर हे निसर्गरम्य ठिकाण सटाणा या तालुक्याच्या ठिकाणाहून १३ किलोमिटर अंतरावर आहे .जाण्यासाठी एस टी बसेस उपलब्ध आहेत .तसेच दोधेश्वर नाक्यावरून टम टम ची सोय आहे . दोधेश्वर येथील प्राचीन शिवमंदिरा मागे हि बारव आपण्यास बघायला मिळेल. मंदिराला वळसा घालून गेल्यावर मंदिराच्या मागेच पायवाट असून ती बारव कडेच जाते. थोड गवताचे रान वाढलेले आहे तरी हि सांभाळून जावे आपली भेट सरपटणाऱ्या प्राण्याशी होऊ शकते. अंदाजे १७८० च्या नंतरची बांधलेली असावी असा अंदाज आहे. बारवेत शिलालेख आहे पण पाणी जास्त असल्यास दिसू शकत नाही . बारवमध्ये उतरण्यासाठी दोन ठिकाणाहून पायऱ्या आहेत .प्रत्येकी १८ पायऱ्या आहेत .दोन मार्ग म्हणजे पूर्वीच्या काळी एका ठिकाणाहून जनावरासाठी व  दुसऱ्या ठिकाणाहून गावकऱ्यासाठी असावे .ह्या बारवच्या समोरासमोर दोन मार्ग आहेत .दुसरा मार्ग हा झाडाझुडपा मुळे बंद झालाय . पायऱ्या उतरल्यावर समोरच कमान आहे आहे.त्यावर अजून एक छोटी कमान आहे . बारव ७ फूट व्यासाची असून तिची खोली ३० फूट असावी असा अंदाज आहे. प्रत्येकी चारीहिं दिशांना छोट्या कमानी आहेत . मुबलक अस पाणी तीत उपलब्ध आहे त्याचा वापर सिंचना साठी होत आहे. मध्य युगीन स्थापत्य कलेचा उत्तम असा हा नुमाना तुम्हाला बघायला मिळेल तरी हि एकदा नक्कीच भेट द्या.



   छत्रपती संभाजीनगर ( आधीचे औरंगाबाद )  हे अगदी सव्वादोन हजार वर्षांपासून महाराष्ट्र आणि जवळपासच्या प्रदेशाच्या मध्य भारताच्या राजधानीचे ठिकाण राहिलेले आहे. सुरवातीला पैठणला सातवाहन,वेरूळला राष्ट्रकुट, देवगिरीला यादव आणि नंतर इस्लामी राजवटी,  छत्रपती संभाजीनगर  शहर हे निजामशाही (नगर), मोगल आणि निजामी (हैदराबाद) राजवटीच्या सुभ्याचे ठिकाण राहिलेले आहे. त्यामुळे या परिसरांत प्राचीन अवशेष मोठ्या प्रमाणात आढळून येतात. यात लेण्या, मंदिरे आणि किल्ले यांबाबत काही एक जागृती तरी आहे. पण याच परिसरांत अतिशय प्राचीन अशा बारवा आहेत त्यांच्याबद्दल मात्र अतिशय उदासिनता आढळून येते.      प्रत्यक्ष छत्रपती संभाजीनगर शहराचा जो भाग आता मुख्य वस्तीचा भाग आहे त्याला फारसा प्राचीन इतिहास नाही. याउलट औरंगाबाद लेण्या, हर्सूल देवी परिसर, सातारा डोंगर परिसर, कर्णपुरा, जाधववाडी येथे जूने संदर्भ आहेत. त्यामुळे जून्या बारवा या शहराच्या मध्यवर्ती अशा ठिकाणी नसून बाह्य भागात आहेत.छत्रपती संभाजीनगर तालुक्यात शेंदूरवादा येथे खाम नदीच्या काठावर सिंधुरवदन गणेशाचे छोटे मंदिर आहे. या मंदिराच्या अंगणात अतिशय छोटी; पण देखणी बारव आहे. तिला चारही बाजूने पायऱ्या आहेत. ती नदीच्या काठावर आहे. पूजेसाठी या बारवेतून पाणी घेतले जायचे. नदीला पूर आला, की बारव बुडते; एवढेच काय मंदिरही पाण्याखाली जाते. आजही ही बारव दिमाखात उभी आहे.
छत्रपती संभाजीनगर ही सैनिकांची वस्ती होती. नंतर मलिक अंबर काळापासून या शहराला चेहरामोहरा प्राप्त झाला. मलिक अंबर काळात पाणी व्यवस्थापनाची वेगळी अशी व्यवस्था नहरींद्वारे केली गेली. याचा परिणाम म्हणजे या परिसरांत बारवांची अवश्यकता राहिली नाही. कारण खापरी नळांद्वारे पाणी संपूर्ण परिसरांत खेळवले गेले होते. तसे नळ जागजागी आढळतात.
छत्रपती संभाजीनगर शहरांतील  एक अष्टकोनी छोटी बारव समर्थनगर मध्ये आहे. (प्लॉट क्र.२४४ च्या बाजूची खुली जागा). हीला पुर्वकडून उतरण्यास पायर्‍या असून त्या परत उत्तरेकडे वळल्या आहेत. बारव अष्टकोनी असून संपूर्ण दगडी बांधकाम उत्तम अवस्थेत आहे. बारवेत भरपुर पाणी आहे. यशवंतराव होळकरांच्या काळात याच जागी एक महाल होता. त्या महालाच्या घुमटाचे अवशेष अजूनही शाबूत आहेत. जिथे आता अतिक्रमण केल्या गेले आहे. त्या महालाचा एक भाग म्हणजे ही बारव असावी.
विद्यापीठ परिसरांत सोनेरी महाल येथे दोन बारवा आहेत. या बारवांचे बहुतांश बांधकाम शाबूत आहे. शिवाय परिसरांत अजून एक मोठी बारव आहे. जिचा  खास उल्लेख करावा लागेल अशी एक बारव म्हणजे हिमायत बागेतील शक्कर बावडी. औरंगजेबाचा काळात हिमायत बाग विकसित केल्या गेली. यात आयताकृती अशी ही शक्कर बावडी आहे. एका बाजूला वीटांचे भक्कम असे कमानी कमानीचे बांधकाम असून त्यावर मोट लावण्याची दगडी रचना आहे. तिथून पाणी उपसले जायचे. बाकी तीनही बाजूंनी बांधीव अशी ही बावडी आहे.
प्रत्यक्ष छत्रपती संभाजीनगर शहर आणि परिसरांत एकूण १८ बारवांची नोंद केल्या गेली आहे. खरं तर  अजूनही काही बारवा सापडतील पण त्या बहुतांश नष्ट झाल्या, बुजल्या, कचरा टाकल्या गेला अशा आहेत. बांधकाम दृष्ट्या त्यांच्यात काही फारसे महत्त्वाचे  नाही.

1. विद्यापीठ परिसर शिवमंदिर बारव - 191
2. सोनेरी महल परिसर बारव-192
3. विद्यापीठ परिसर शिवमंदिर बारव 2- 193
4. कर्णपुरा देवीमंदिर बारव -194
5. शिवमंदिर बारव - 196
6. चरणदास हनुमान मंदिर बारव - 432
7. निपट निरंजन बारव - 433
8. सोनेरी महल परिसर बारव 2 - 434
9. विद्यापीठ परिसर बारव 3 - 435
10. छत्रीची बारव - 436
11.  गंगा बावडी - 437
12.  हरसिद्धी मंदिर (हर्सूल) बारव - 438
13. हरसिद्धी मंदिर बारव 2- 439
14. सुरेवाडी महादेव मंदिर बारव - 440
15. गुरूची बावडी- 441
16. समर्थ नगर बारव - 795
17. शक्कर बावडी - 986
18. हरसिद्धी मंदिर बारव 3 - 1276  

छत्रपती संभाजीनगर परिसरांत बारवांची स्थिती भयानक बनली आहे.छत्रपती संभाजीनगर तालूक्यात एकूण नउ बारवा आहेत. 
१) जांभळी गावातील बारव :-
छत्रपती संभाजीनगर - पैठण रोडवर गेवराई तांड्यापासून बोकुड जळगांवच्या रस्त्याने पुढे गेल्यावर जांभळी गावात एक प्राचीन बारव आहे. गावातील मस्जीदच्या भिंतीला खेटूनच ही बारव आहे. चारही बाजूने उतरत गेलेल्या पायर्‍या. अतिशय खोल अशी ही बारव संपूर्णत: सुस्थितीत  आहे. वरचे काही दगड ढासळले आहेत. बारवेला चार देवकोष्टकं आहेत. एका ठिकाणी महादेवाची पिंड आहे. बारवेत कचरा गोळा झालेला आहे.
२)  बीडकीन शहरात भर बाजारात बारव आहे. किल्लीच्या आकाराची ही सुंदर बारव संपूर्ण सुस्थितीत आहे.एका बाजूने पायर्‍या आहेत. ही बारव गोल अकाराची आहे. पायर्‍यां जवळ देवकोष्टक असून त्यात सात आसरा आहेत. आजही या बारवेतून पाण्याचा उपसा जवळचे लोक मोटार लावून करतात. पण याची कुणीच साफसफाई करत नाही. बारवेचा अगदी एकही चिरा ढासळलेला नाही. 

३) बीडकीन शहरातच पैठणच्या दिशेने जाताना मुख्य रस्त्याला लागून साई मंदिरा जवळ असलेल्या मुस्लीम कबरस्तानात एक सुंदर बारव आहे. याच  चौकोनी आकाराच्या बारवेच्या काठावर प्राचीन महादेव मंदिराचे अवशेष आजही विखुरलेले आहेत. महादेवाची खंडित पिंड आहे. तसेच भंगलेली ती गणेश मुर्ती आहे. 
    बीडकीन परिसरात तिसरी बारव  एकात एक चार टप्पे असलेली आहे. एका बाजूने या बारवेला प्रवेशाच्या पायर्‍या आहेत. बारवेत समोरा समोर असे दोन मंडप आढळून येतात. एका देवकोष्टकांत शेषशायी विष्णुची मूर्ती ठेवली आहे. छत्रपती संभाजीनगर परिसरांत बारवेत ज्या देवता आढळून येतात त्याचा पुरावा केवळ बीडकीन येथेच मिळतो. इतर ठिकाणच्या मुर्ती आता अस्तित्वात नाहीत. शेषशायी विष्णु मुर्ती ही केवळ जलाशयापाशीच आढळून येते. क्षीरसागरात शेषशय्येवर पहुडलेले विष्णु आणि त्यांची पाय दाबणारी लक्ष्मी अशी ही मुर्ती असते. याच मुर्तीच्या प्रभावळीत अष्टदिक्पाल यांच्याही मुर्ती आढळतात.
४)  शेकटा गावातील बारव :-
    छत्रपती संभाजीनगर जवळ वाळूजपासून शेंदूरवाद्याकडे एक रस्ता जातो. खाम नदीच्या काठावर शेंदूरवादा आहे. या शेंदूरवाद्याच्या बाजूला आताच्या बीडकीन पासून येणार्‍या मोठ्या रस्त्यावर (शेंद्रा-बीडकीन-नगर रोड) शेकटा आहे. शेकट्याची बारव औरंगाबाद परिसरांतील सर्वात भव्य आणि खोल अशी बारव आहे. ही बारव पाहून अक्षरश: थक्क व्हायला होते. अशा भव्य  बारवा मराठवाड्यात अगदी दोन चारच असतील (चारठाणा आणि मादळमोही). ही बारव चौरस आकाराची आहे. पश्‍चिम बाजूला हीला दोन ठिकाणी प्रवेश करण्यासाठी पायर्‍या कोरलेल्या आहेत. प्रवेशाच्या पायर्‍या संपल्यावर एक सोपान (सपाट अशी जागा) सोडलेली आढळून येते. तेथून पर चौरस आकारात पायर्‍या उतरत उतरत निमुळत्या होत जातात. बारवेच्या दक्षिण बाजूला चार खांबावरचे शिवायलय आहे. त्याचे खांब आता ढासळले असून केवळ चौथरा शिल्लक आहेत. सहसा बारवेत न आढळणारी गोष्ट या बारवेत दिसून येते. पाणी उपसण्यासाठीची दगडी रचना दक्षिण काठावर केलेली आहे. मोटेने उपसलेले हे पाणी वाहून नेण्यासाठी दगडी हौद आणि पन्नास फुट अंतरापर्यंत दगडी नाला कोरलेला आहे. हे सहसा बारवेत आढळत नाही.या बारवेत एकूण प्रत्ये बाजूला दोन असे आठ देवकोष्टके आहेत. पण यात आता देवतांच्या मुर्ती आढळून येत नाहीत.  शिवालयातील महादेवाची पिंडी शाबुत आहे. आजही शिवरात्रीला येथे उत्सव साजरा केला जातो. बारवेला  भव्य अशी संरक्षक भिंतही बांधलेली आहे. सहसा बारवा संपूर्णत: जमिनीतच असल्याने अशा भिंती आढळून येत नाहीत. पण शेकट्याची बारव ही याला अपवाद आहे. बारव संपूर्ण चांगल्या स्थितीत आहे. केवळ आणि केवळ गावकर्‍यांची अनास्था दिसून येते. बारवेभोवती निव्वळ कचराकुंडी आहे. शेकट्याच्या बारवेमध्ये जी शेषशायी विष्णुची मुर्ती झिजलेल्या अवस्थेत सापडली तीचे संवर्धन गावकर्‍यांनी नुकतेच केले आहे.  

५)  भगत वाडी गावाच्या शिवारात असलेली बारव :-
    ही बारव संपूर्णत: बूजवून टाकली आहे. काटेकुटे इतके  आहेत की बारव दिसतच नाही. झाडांत एक दगडी मोठी शिळा पालथी दिसली. तिच्यावर  काही कोरीवकाम असावे असे दिसत होते.आतमध्ये शेषशायी विष्णुची मुर्ती आहे. स्थानिक लोक या मुर्तीला शनीदेव म्हणून संबोधायचे. शेषशय्येवर पहूडलेला विष्णु,  त्याचे पाय चेपणारी लक्ष्मी, त्याच्या नाभीतून निघालेल्या कमळावर विराजमान  ब्रह्मदेव अशी ती खंडित झिजलेली मुर्ती. शेषशायी विष्णुची मुर्ती सहसा बारवेजवळच आढळते. 

६) दहेगांव बंगला या गावातील बारव :- 
    ही बारव अतिशय चांगल्या पद्धतीने जपलेली आहे. बारवेत सध्या वरपर्यंत पाणी आहे. बारवेला गावकर्‍यांनी तारेचे फेन्सिंग करून संरक्षीत केले आहे. बाजूच्या मंदिराचाही जिर्णोद्धार केलेला आहे. 
  नविन कायगांव गावांत जूळ्या गणपती मंदिराला लागून प्राचीन बारव आहे. ही आता बांधकामाच्या साहित्याने दबून गेली आहे. तिच्यावर अरेबिक लिपीत शिलालेखही आहे.  याच गावांतील अगदी दूर जूने कायगांव ते गंगापूर रस्त्यावर असलेल्या बारवेची शांकांतिका तर विलक्षण आहे. ही सर्वात मोठी प्रचंड अशी प्राचीन बारव तशीच उद्ध्वस्त अवस्थेत पडून आहे. तळाचे दगड तेवढे शाबूत आहेत. बारवेतील गणपती म्हणून एक बारव आणि लहान गणेश मंदिर जामगाव शिवारात आहे. ही बारव चांगल्या स्थितीत आहे. पाण्याने पूर्ण भरलेली असल्याने सध्या खाली उतरता येत नाही.
Amrut Tirth (Stepwell)
७ )  वेरुळचे शिवालय तीर्थ : 
      ही बारव फार पुरातन आहे. अहिल्याबाईंनी हीचा इ.स. १७६९ मध्ये जीर्णोद्धार केल्याचा उल्लेख तेथील शिलालेखात आहे. 
स्थापत्याच्या दृष्टीने अतिशय देखणे असे हे बांधकाम आहे. लाल चिर्‍यांत ही बारव बांधल्या गेली आहे. चारही बाजूंनी हीला करण्यासाठी सुंदर पायर्‍या आहेत. एका खाली एक असे सात टप्पे अशी पायर्‍यांची रचना केली आहे. बारवेच्या चारही बाजूनी अष्टकोनी आकाराचे बुरूजासारखे भक्कम बांधकाम केलेले आहे. प्रत्येक  बाजूस एकूण ५६ पायर्‍या या बारवेस आहेत. चौथ्या टप्प्यांत चार दिशांना चार आणि चार कोपर्‍यांत चार अशी आठ देवळे आहेत. या आठही देवळांची शिखरे वैशिष्ट्यपूर्ण आणि वेगवेगळी आहेत. आठ दिशांच्या आठ देवता असे अष्ट दिक्पाल येथे दाखविले आहेत.
  
८ )  खुफिया बावडी :
    ही बारव देवगिरी किल्ल्याच्या पाठीमागे फतेयाबाद गावात आहेत. औरंगाबाद पासून दौलताबाद कडे जाताना देवगिरी किल्ल्यासाठी वळताना अगदी अलिकडेच मुख्य रस्ता सोडून डावीकडे एक वाट कमानीतून गावात शिरते. त्या वाटेने  केसापुरी रस्त्याला पुढे जाताना फतियाबाद नावाचे एक छोटे गाव लागते. या गावाच्या पाटीपाशीच मुख्य रस्त्यापासून जेमतेम २०० मीटर अंतरावर शेतात दगडी बारव आहे.हीला खुफिया बावडी असे म्हणतात. या बारवेला ‘खुफिया बावडी’ असे म्हणतात. डॉ.दुलारी गुप्ते कुरेशी यांच्या ‘दौलताबाद फोर्ट’ या इंग्रजी पुस्तकात हीचा उल्लेख आहे. त्या भागात बोली भाषेत या बारवेला ‘चोर बावडी’ असे म्हणतात. 
हे निजामशाहीच्या काळातील बांधकाम असल्याचे मानले जाते. एका खाजगी शेतात ही बावडी आहे. उत्तरदिशेने जमिनीत उतरत गेलेल्या पायर्‍या आहेत. तीन तीन ओवर्‍यांच्या तीन भव्य बाजू आणि प्रवेशाची चौथी बाजू अशी ही खुफिया बावडी. हीची रचना संपूर्णपणे जमिनीच्या आतच असल्याने हीचे कसलेच अस्तित्व दुरून ओळखू येत नाही. दगडी पायर्‍या उतरून आत उतरतो तेंव्हा पाताळात उतरतो आहोत असेच भासते. अर्ध्या पायर्‍यांवर आल्यावर दोन्ही बाजूच्या ओवर्‍यांवर कडे जाणार्‍या दोन दिशांच्या पायर्‍या लागतात. आणि मुख्य पायर्‍या खाली पाण्याकडे उतरत जातात. बारवेच्या तिन्ही बाजूला तीन कमानींच्या भक्कम सुंदर ओवर्‍या आहेत. पाण्यात उतरणार्‍या पायर्‍यांच्या विरूद्ध दिशेला ज्या तिन ओवर्‍या आहेत त्या कमानी बाकी दोन पेक्षा जास्त मोठ्या आहेत. त्यामुळे त्या भागात कमानीचा एक टुमदार छोटा महालच तयार झाला आहे. 
गुप्त मसलतीसाठी हीचा वापर केला जायचा. चौरस आकाराच्या या बावडीच्या तीनही बाजूस कमानींची मोठी दालने आहेत. कमानींवर घुमट बांधण्याची शैली बहमनी कालखंडात मराठवाड्यात आढळून येते. पूर्वीच्या काळात अशा दगडी कमानी नाहीत. खुफिया बावडीचे बांधकाम अजूनही भक्कम आहे. या बावडीचे पाणी शेतकरी आजही वापरतात.बारवेचे सगळे बांधकाम भक्कम आहे. भरपूर पाण्याने ही बारव भरलेली आहे. बारवेच्या काठावर सुगरणीचे सुंदर खोपे आहेत. 
 याच खुफिया बावडीची लहान बहिण शोभावी अशी तीन ऐवजी एकाच कमानीच्या चार बाजू चार ओवर्‍या अशी छोटी वीटांनी बांधकाम केलेली बावडी औरंगाबाद शहरात कर्णपुरा देवीच्या मंदिरा जवळ उत्तर बाजूला शेतात आहे. ही बारव मोगलांच्या काळातील असावी. भाजलेल्या दगडी पातळ विटांनी हीचे बांधकाम केले आहे.
९ ) हर्सूल  देवी परिसरांत तीन बारवा आहेत. एक तर प्रत्यक्ष देवीच्या मंदिरासमोरचे कुंडच आहे. त्याचा आकार चौरस आहे. त्याचा आकारही लहान आहे. बाकी दोन बारवा जरा दुर अंतरावर आहेत. मंदिराच्या दक्षिणेला जी मोठी बारव आहे ती एका मोठ्या बांधकामाचा महलाचा भाग असावा अशी आहे. जाळी उभारून तीला संरक्षीत केल्या गेले आहे. तिचा आकार चौरस आहे. याच बारवेजवळ एक सतीचा बुरूज आहे. शिवाय एक राजस्थानी शैलीतील एक समाधीसारखे बांधकामही आहे. हा संपूर्ण महल असावा. आता तिथे केवळ मोकळी जागा आहे. जोत्याचे दगडी अवशेष काही ठिकाणी सापडतात.
  १० ) सातारा डोंगरावर खंडोबाचे मुळ प्राचीन मंदिर आहे. त्याला कालखंड अगदी यादवांच्याही आधी उत्तर चालूक्यांच्या काळापर्यंत जातो. याच मंदिरा जवळ दगडी बांधकाम असेलेले कुंड आहे. या कुंडाच्या तीन बाजू नीट बांधलेल्या आहेत. उतराची तिसरी पश्चिमेकडची बाजू मोकळी आहे. म्हणजे तेथूनपाणी वहात येवून या कुंडात साठवले जात असे. आजही या कुंडात पाणी साठते.
     सातारा  परिसरांत खंडोबाचे मंदिर आहे. याच परिसरांत दोन बारवा आहेत. या बारवांची पडझड झालेली आहे. अहिल्याबाईंनी या खंडोबा मंदिराचा जिर्णोद्धार केल्याचा उल्लेख आढळतो. त्याच काळात या बारवाही दुरूस्त केल्या असाव्यात. पण त्या आता चांगल्या अवस्थेत नाहीत.

हतनुरची बारव :-

हतनूर (ता. सेलू जि. परभणी) च्या बहाद्दर गावकर्‍यांनी. मंदिराच्या जिर्णोद्धारासाठी त्यांनी अवलंबलेले सुत्र मोठे विलक्षण आहे. गावच्या शिवारात ज्यांची ज्यांची शेती आहे त्या सगळ्यांनी आपल्या शेतात जो माल होईल.  त्याच्या १ टक्के इतका माल अथवा तो विकून येणारी रक्कम या कामासाठी देगणी म्हणून द्यायची. पाच वर्षांत अशा पद्धतीने या गावकर्‍यांनी तब्बल एक कोटी रूपये उभे केले. गावात प्राचीन नागेश्वर शिव मंदिर आहे. त्याच्या समोर बारव आहे. या मंदिरावर एक शिलालेख सापडला आहे. त्यानुसार याचा कालखंड हा इ.स. १३०१ चा इतका जूना निघतो आहे. या मंदिराच्या समोर चारही दिशांनी प्रवेश असलेली देखणी बारव आहे. हीचे दगड निखळले होते. बराचसा भाग पडला होता. ही बारव उकलल्या गेली. एका एका दगडावर नंबर टाकून अतिशय कुशलतेने दगडांची रचना परत केल्या गेली. जिथले दगड तुटले होते अथवा नाहिसे झाले होते तिथे नविन दगड घडवून बसवले.गावात ज्यांनी ज्यांनी मंदिराचे आणि परिसरांतील दगड आपल्याकडे नेले आहेत अथवा आपल्या बांधकामात वापरले आहेत ते सगळे शोधून यांनी परत आणले. सलग दोन वर्षे हे किचकट काम चालेले. इ.स. २०१९ च्या फेब्रवारी महिन्यात बारवेचे काम पुर्ण झाले. एकूण तब्बल २२ लाख रूपये त्याला खर्च आला. मंदिराचा परिसर त्याच्या जोत्याचे ओट्याचे निखळलेले दगड, अंगणातील फरशी हे सर्व नव्याने करण्यात आले. मुखमंडपाचे खांब कलले होते त्याला अधार देण्यात आला. हे सगळं करण्यासाठी ज्या पद्धतीनं गावकर्‍यांनी एकोपा दाखवला तो विलक्षण आहे. पक्ष गट तट आपसांतील भाउबंदकी असले अडथळे त्यांनी मध्ये येवू दिले नाहीत. या परिसरांत शिवरात्रीला मोठी यात्रा भरते आहे. पंचक्रोशीतील लोक गावात गोळा होतात. मंदिराचे भक्त दूर दूरवरून येतात. याच परिसरांत प्राचीन मंदिराचे अवशेषही विखुरलेले आहेत. ते एकत्र करून ठेवण्याची गरज आहे. अभ्यासकांना या अवशेषांचे निरीक्षण केले पाहिजे. त्यावर सविस्तर लिखाण संशोधन केले पाहिजे. 

    मराठवाड्यात खुप प्राचीन मंदिरं आहेत. पुरातत्त्व खात्याकडे ज्यांची नोंदणी झाली आहे किंवा जे संरक्षीत वास्तू म्हणून आहेत त्यांच्या शिवाय भरपूर अशी स्थळं आहेत. शासनाकडे संरक्षीत असलेल्यांसाठी शासनाकडून निधी मिळवून त्यांचे काम करता येवू शकते त्यासाठी पाठपुरावा निधी मिळावा म्हणून दबाव हे तंत्र अवलंबता येईल. पण इतर जी मंदिरं आहेत, जून्या अतिशय सुंदर अशा बारवा आहेत, नदीवरचे घाट आहेत त्यांचे संरक्षण संवर्धन होण्यासाठी चळवळ उभारावी लागणार आहे. जून्या मंदिरांची दूरूस्ती करणारे पाथरवट शिल्पी यांनाही या कामात सहभागी करून घेतले तर त्यांच्याही रोजगाराचा प्रश्‍न मिटेल. आजही हे काम करणारे शिल्पकार उपेक्षेत जगत आहेत. ज्यांनी हजारो वर्षोंपासून ही कला जपली आहे त्यांची दखल पुरेशी घेतली जात नाही. अगदी त्याच पद्धतीनं मुर्ती शास्त्रीय ग्रंथाचा आधार घेवून मुर्ती घडवणारेही आहेत. त्यांच्या हातातील कसब पुरेसे वापरलेच जात नाही अशी त्या लोकांची खंत आहेत.मराठवाड्यात प्राचीन बारवा अतिशय सुंदर पद्धतीनं बांधलेल्या  आहेत. पण त्या केवळ प्राचीन वास्तू आहेत असं नव्हे. त्या म्हणजे 
जलव्यवस्थापनाचा उत्कृष्ट नमुना आहेत. या बारवांचा जिर्णाद्धार करताना दुरूस्ती करताना जलतज्ज्ञांचा सल्ला मोलाचा आहे. त्या नुसारच ही कामं झाली पाहिजेत. 

 चारठाण्याची बारव :-

     चारठाणा हे परभणी जिल्ह्यातले एक अगदी साधे से खेडेगाव. पण इथे असलेल्या पुरातन मंदिरांच्या आणि भाग्नावाशेषांच्या ठेव्यामुळे ते अनेक इतिहासतज्ञाना आणि पुरातन वास्तू प्रेमीना माहिती असते. तरीही ते इतके काही प्रसिद्ध नाही.( ते एका अर्थी बरेच आहे म्हणा अन्यथा ह्या गावाताली शांतता बिघडायची आणि फक्त काळाचेच घाव सोसत आलेला हा ठेवा पर्यटकांच्या उत्पाताने नष्ट व्हायचा.)
चारठाण्याचे मूळ नाव चारूक्षेत्र. चारू म्हणजे सुंदर. हा परिसर तसा रखरखीतच पण डिसेंबर- जानेवारी महिन्यात मात्र हवामान आल्हादकारक असल्याने सुंदर वाटतो. हा सगळा भाग राष्ट्राकुटान्च्या अंमलाखाली येत असे (इसविसनाचे ६ वे ते ९ वे शतक) राष्ट्रकुट सम्राट अमोघवर्ष्र. ह्याची आई चारुगात्रीदेवी ही मोठी शिवभक्त होती. तिने ह्याभागात एक सहस्त्र शिवमंदीर उभारण्याचा संकल्प सोडला होता (हे तिचे जन्म गाव असावे किंवा इथे काही शुभ घटना घडली असावी)तिची ही इच्छ राजाने पूर्ण केली. आणि खरोखरच ह्यागावात जवळपास ३६० लहान मोठी शिव मंदिरे आहेत.बरीच जमिनीखाली गाडली गेलेली आहेत. १९९३ च्या भूकंपानंतर इथल्या अनेक मंदिरांची बरीच नासधूस झाली आहे पण नवीन बरीच मंदिरे सापडलीही आहेत. अजूनही सापडतात अक्षरश: लोकांच्या घरात, अंगणात शेतात सापडतात. भारतीय पुरातत्व खाते जप्त करेल, घेऊन जाईल, जागा बळकावेल अशा भीतीने लोक सांगत नाहीत किंवा सापडलेली शिवलिंग, मुर्त्या बाहेर काढून ठेवतात. अशी मूळ जागा सोडलेली, रस्त्याच्या कडेला, झाडाखाली, वळचणीला पडलेली शिल्प गावात जागोजागी खूप दिसतात .

Simple, Free Image and File Hosting at MediaFire

Simple, Free Image and File Hosting at MediaFire

Simple, Free Image and File Hosting at MediaFire

Simple, Free Image and File Hosting at MediaFire

Simple, Free Image and File Hosting at MediaFire

Simple, Free Image and File Hosting at MediaFire

ह्या अशा मुर्त्या/ कोरीव खांब जागोजागी पडलेलेआढळतात. गोकुलेश्वर मंदिराबाहेर अशा भग्न मुर्त्या लोकांनीच आणून ठेवल्या आहेत. त्या अत्यंत हलाखीत आणि दुर्लक्षित अवस्थेत आहेत. हा अनमोल ठेवा नष्ट होईल किंवा चोरी होईल.
Simple, Free Image and File Hosting at MediaFire
Simple, Free Image and File Hosting at MediaFire
 गोकुळेश्वर मान्दिराबाहेरची पुष्करणी – अत्यंत सुंदर
Simple, Free Image and File Hosting at MediaFire
पुष्कारणीतले कोरीव काम

Simple, Free Image and File Hosting at MediaFire
 ही एवढी पाण्याने भरलेली नसते पण जर पाउस तुफान झाला. तर हि भरलेली आहे.

पिंगळेश्वर मंदिर, पिंगळी, जिल्हा. परभणी .

पिंगळी हे गाव परभणी शहरापासून अंदाजे २७ कि.मी. अंतरावर आहे. पिंगळेश्वर मंदिर हे पिंगळी गावाच्या मध्यभागी आहे. मंदिर पुर्वाभिमुख असुन मंदिराच्या समोर प्रचंड पुष्करणी आहे. सध्या ही पुष्करणी दुष्काळामुळे पूर्ण कोरडी आहे. 
मंदिराचा दर्शनी भाग
.मंदिराचा दर्शनी भाग

.मंदिर व समोरील पुष्करणी

.मंदिर व समोरील पुष्करणी


.मंदिर व समोरील पुष्करणी

.पुष्कणी मधील देवकोष्ठातील महिषासुरमर्दिनीची भग्न मूर्ती

.नरसिंहाची भग्न मूर्ती

रहस्यमय वालूर बारव  परभणी

    देशात आणि राज्यात पुरातन, ऐतिहासिक आणि वैशिष्ट्यपूर्ण बांधकाम रचना असलेल्या शेकडो बारव आढळून येतात. पण परभणी जिल्ह्याच्या सेलू तालुक्यातील वालूर या गावी असलेली बारव ही तिच्या बांधकाम वैशिष्ट्यामुळे केवळ देशातीलच नव्हे तर जगातील एकमेवाद्वितीय बारव ठरावी. आठ बाजूंनी गोलाकार फिरत बारवाच्या तळापर्यंत जाणार्‍या पायर्‍या आणि या पायर्‍यांच्या सुरुवातीला बांधण्यात आलेल्या आठ देवकोष्टमुळे (ओसर्‍या किंवा देवळी) ही बारव अन्य बारवांच्या तुलनेत ‘मुलखावेगळी’ ठरते.
वालूरची पुरातन पार्श्वभूमी!
     वालूर या गावाला आणि एकूणच या परिसराला प्राचीन पुरातन अशी पार्श्वभूमी आहे. अशी आख्यायिका सांगितली जाते की, महर्षी वाल्मिकी यांनी या ठिकाणी तपश्चर्या केली होती. तपश्चर्येच्या दरम्यान वाल्मिकींच्या अंगावर वारूळ वाढत गेले. त्यावरून या गावाला सुरुवातीला वारूळ असे नामाभिधान प्राप्त झाले. कालांतराने त्याचाच अपभ्रंश होऊन गावाला वालूर हे नाव मिळाल्याचे पुरातन दाखले मिळतात. शिवाय या भागाला नाथ संप्रदायाची आणि पर्यायाने तंत्रविद्येचीही प्राचीन परंपरा असल्याचेही ऐतिहासिक दाखले आहेत.
     याच वालूर गावाच्या जवळपास मध्यभागी ही प्राचीन बारव आहे. ही बारव किती प्राचीन आहे त्याचे ऐतिहासिक दाखले उपलब्ध नाहीत. पण या बारवच्या बांधकाम शैलीनुसार आणि वैशिष्ट्यपूर्ण रचनेनुसार सुमारे एक ते दीड हजार वर्षांपूर्वी या बारवचे बांधकाम करण्यात आले असण्याची शक्यता पुरातत्त्व खात्याने व्यक्त केलेली आहे. गेल्या वर्षीपर्यंत ही बारव पूर्णपणे दुर्लक्षित होती आणि ग्रामस्थांच्या जणू काही विस्मृतीत गेली होती. बारवभोवती अनेक झाडेझुडपे उगवून बारव जशी काही कचर्‍याने भरून गेली होती; मात्र परभणी जिल्ह्यात बारव संवर्धन अभियान सुरू झाले आणि या बारवला जणू काही पुनर्जन्मच मिळाला. बारव संवर्धन समितीचे मल्हारीकांत देशमुख, वारूलचे सरपंच संजय साडेगावकर, शैलेश तोष्णीवाल, दत्ताभाऊ राख, मारोतराव बोडखे, गणेश मुंढे, सन्ना अन्सारी यांच्यासह तमाम गावकर्‍यांनी श्रमदानातून या बारवची स्वच्छता केली आणि प्राचीन, पुरातन, वैशिष्ट्यपूर्ण आणि काहीसा गूढ स्वरूपाच्या बांधकामाचा एक जगावेगळा नमुना संपूर्ण जगापुढे आला.
तंत्रविद्येचा प्रभाव!
    या बारवच्या बांधकामात आठ या संख्येला फार महत्त्व दिलेले दिसते. आठ बाजूने बारवात उतरणार्‍या पायर्‍या, आठ देवकोष्ट, पायर्‍यांची 72 आणि 118 अशी संख्या या बाबी विचारात घेता या बारवच्या बांधकामावर तंत्रविद्येचा प्रभाव पडल्याचे जाणवते. बारवमध्ये आढळून येणारे आठ देवकोष्ट हे अष्टभैरव, अष्ट जलदेवता, अष्टांगसिद्धी अशापैकीच कशाचे तरी प्रतीक असाव्यात, असेही मानण्यात येते. या भागाला नाथ संप्रदायासह तंत्रविद्येची लाभलेली प्राचीन परंपरा विचारात घेता तंत्रविद्येच्या प्रभावातून या बारवचे बांधकाम झाले असण्याची शक्यता पुरातत्त्व खात्याने व्यक्त केलेली आहे.

एकमेवाद्वितीय बारव!
    देशात आणि राज्यात अनेक प्राचीन बारव आढळून आल्या असल्या तरी वालूर या गावातील बारवमध्ये आढळून आलेली वैशिष्ट्यपूर्ण रचना अन्य कोणत्याही बारवमध्ये आढळून येत नाही. या बारवची गूढ रचना आणि तंत्रविद्येची पार्श्वभूमी विचारात घेता देशातील इतिहास संशोधकांच्या द़ृष्टीने या बारवचा इतिहास उलगडणे आव्हानात्मक ठरणार आहे.
रहस्यमय बांधकामाचे कुतूहल!
    या बारवचा आकार नदीतील पाण्याच्या भोवर्‍याप्रमाणे फिरत्या स्वरूपाचा भासतो. 32.2 फूट लांब, 30.8 फूट रुंद आणि 32 फूट खोलीची ही बारव आहे. चक्राकार पद्धतीने फिरत फिरत आठ बाजूने बारवाच्या तळाशी जाणार्‍या दगडी पायर्‍या आहेत. दोन टप्प्यात खाली उतरणार्‍या या पायर्‍यांची संख्याहीट 72 आणि 118 अशा दोन टप्प्यांत विभागली गेली आहे. ज्या आठ बाजूंनी या पायर्‍यांची सुरुवात होते, त्याच्या सुरुवातीलाच आठ देवकोष्ट (ओसर्‍या किंवा देवळी) आहेत.

डाक टपाल तिकीट

 जागतिक वारसा दिनानिमित्त टपाल खात्याकडून प्राचिन बारव स्थापत्याचे अंकन होण्याचा बहुमान प्रथम मिळतोय हे विशेष.
  ”वर्ड हेरिटेज डे ” निमित्त मुंबई पोस्टल विभागाने १८ एप्रिल २०२३ रोजी परभणी जिल्ह्यातील वालूर येथील कुंडलाकार (हेलीकल स्टेपवेल)बारव व नगर जिल्ह्यातील हत्ती बारवच्या छायाचित्रांचे तिकिट प्रकाशित केले आहे.

मुखेडची ऐतिहासिक बारव

नांदेडपासून 85 किलोमीटर अंतरावर असणाऱ्या मुखेड शहरात राष्ट्रकुट चालुक्यकालीन स्थापत्याचे नमुने पाहायला मिळतात. येथील दशरथेश्वर मंदिर आणि नागनाथ मंदिरात उत्कृष्ट शिल्पकला पाहायला मिळते.
सुंदर अशा बारवसाठी मुखेड प्रसिद्ध आहे. 10व्या आणि 11व्या शतकातील मंदिरे तीर्थकुंडाशेजारी स्थापित झालेली दिसतात. या तीर्थकुंडांना बारव म्हटले जाते. मुखेडमध्ये अशाच स्वरूपाचे बारव दशरथेश्वर मंदिराच्या उजव्या बाजूस आहे.

 पोखरणी बारव : अंबड

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांनी सन १७६८ दरम्यान निर्माण केलेली पुष्कर्णी बारव गेल्या अनेक वर्षापासून अंबडकरांची तहान भागविण्याचे काम करीत होती. आजही या बारवेशेजारी असलेले जारच्या प्लँटंला बारवेच्या पाण्याचा पाझर आहे. या पुष्कर्णी बारवे ऐवढी मोठी बारव मराठवाड्यात कुठेच पहायला मिळत नाही. या बारवेला पुर्व पश्चिम दक्षिण उत्तर या चार दिशेला दरवाजे आहेत. दगडी पाय-या नंतर सुंदर असे अंतर्गत घाट असुन त्यावर पुर्वी धार्मिक विधी अर्थात पिंडदान व गंगापुजन केल्या जात असे.

 
बारवेच्या आतील सभामंडप व मंदिर

तर बारवेत सुंदर असे महादेवाचे मंदिर असुन समोर सभामंडप व त्यावर कोरलेली अनेक हत्तींची गजमाळ आणि विविविध फुले, वेलीची केलेली नक्षीकाम बारवेच्या सौंदर्यात भर घालणारे असुन सभामंडपात नंदी असुन गर्भगृहात शिवलिंग स्थापन केलेले आहे. याच मंदिराच्या भिंतीवर तीस देवकोष्टक व कपडे बदलण्यासाठी तयार केलेली स्वतंत्र खोली पहायला मिळते. देवकोष्टकात पुर्वी मुर्ती असाव्यात मात्र कधीकाळी त्या शिवलिंगासह चोरीला गेलेल्या आहेत याबाबत कुणाकडे ही माहिती नाही. इतके चांगले मंदिर असतांनाही शहरातील अनेक लोक इकडे येत नाहीत त्यामुळे गर्दुल्यांनी मंदिराचा ताबा घेतलेला दिसतो.
 उन्हाळ्यात हे मंदिर थंडगार असते दरम्यान पावळ्यातील पाण्यामुळे मंदिर पाण्याखाली असते त्यामुळे बारवेत टाकलेला सर्व कचरा त्यात घाण कपडे,सोड्याचे रिकामे पुडे अर्थात पाँलिथीन पिशव्या, रिकाम्या दारुच्या दारुच्या बाटल्या, बिसलरीच्या बाटल्या, घरातील निर्माल्य तसेच शेजारच्या बाजारपेठेतील दुकानातील कचराही नियमित टाकल्या जातो.बारवेत जिकडे तिकडे कचरा, उगलेली झाडे पहायला मिळतात तर पालिकेने केलेले उद्यानही दुरावस्थेत सापडलेले आहे. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांनी बारव निर्माण केल्याने त्यांच्या नावे उद्यान असले तरी ते अर्धे अतिक्रमण झालेले आहे.
जालना बखर नावाच्या पुस्तकात एक मजकूर आहे त्यात लिहले आहे की ही बारव सुवासिनींची मनोकामना पुर्णकामना करणारी बारव असुन यात सात आसरा आहेत. त्याची पूजाअर्चा तसेच जावळ देण्याची परंपरा आहे.इथेच पिंडदान व गंगापुजन केल्यास पितृशांती लाभते तसेच जे लोक बारवेत घाण टाकतील ते नेहमीच संकटात, दुःखात,अपयशी राहतील बारव हे लक्ष्मीचे प्रतिक आहे.त्यामुळे बारव नेहमी स्वच्छ ठेवून तीचे पुजन व्हायला हवे साक्षात ती गोदावरी असुन पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांनी पैठण येथील सिध्देश्वर महादेव मंदिराखालुन भुमिगत वाटेने अंबडला आणलेली आहे, असे सांगितले जाते.
परभणी तालुक्यातील आर्वी येथील बारव
जालना जिल्ह्यातील मंठा जवळील हेलासवाडीतील महादेव मंदीराजवळील बारव
जालना जिल्ह्यातील भोकरधन तालुक्यातील लोणगावमधील रेणुकामाता मंदीराजवळील बारव
जालना जिल्ह्यातील घनसांगवी तालुक्यातील पारडगावमधील बारव
परभणी जिल्ह्यातील सेलु तालुक्यातील रायपुर गावातील महादेव मंदीराजवळील बारव
जालना जिल्ह्यातील घनसांगवी तालुक्यातील दहेगाव देवीमधील रेणुकादेवी मंदीराजवळील बारव
हिंगोली जिल्ह्यातील वसमत गावातील शुकानंद मठाजवळील बारव

 खजाना बावडी
    बीड शहरापासून पाच किलोमीटर अंतरावर असलेली खजाना विहीर ही कायम स्वरूपी जलस्रोत म्हणून चार शतकाहून अधिक काळापासून ओळखली जाते. .बीड शहराजवळील शेकडो एकर जमिनींना भिजवणारी ही खजाना बावडी भूगर्भातील जलस्रोत शोधण्याच्या तंत्राचा अनोखा नमुना आहे.बीडचं मूळ नाव चंपावती नगर असं होतं. मोहम्मद बिन तुघलकाने देवगिरीवर स्वारी केल्यानंतर हा भाग त्याच्या राज्यात समाविष्ट झाला. त्यानंतर त्याने चंपावती हे नाव बदलून भीर हे पारशी नाव दिलं आणि भीरचा अपभ्रंश बीड असा झाला. भीर याचा अर्थ पाण्याचा प्रदेश असाही होतो. बीड शहराजवळच साधारण १६२५ ते १६३० या काळात बांधली गेलेली ही भव्य जलवास्तू आहे.




   शहरापासून दक्षिण दिशेला पाच किलोमीटर अंतरावर 'खजाना विहीर' आहे. या विहिरीचा व्यास सुमारे ५० फूट आहे, तर खोली २३.५ मीटर आहे. जमिनीपासून खोल १७ फुटांवर विहिरीत गोलाकार व्हरांडाही असून त्यावर सहज फिरता येतं. त्या व्हरांड्याखाली सहा फूट विहीर आहे. या विहिरीचं पाणी कायम किमान चार फूट तरी असतंच. गेल्या शतकभरात या विहिरीचं पाणी पावसाळ्यात वाढलं नाही किंवा उन्हाळ्यात आटलं नव्हतं. बीड शहराला पाणी पुरवठा करण्यासाठी विहिरीमधून कालवा बांधलेला आहे. या कालव्याद्वारे बीड शहरातील बलगुजर भागात पाणी आणण्यात आलं असून, या भागातील साडेचारशे एकर शेती कुठलंही उपकरण न वापरता विहिरीच्या पाण्यामुळे सिंचनाखाली आहे.
   या विहिरीचं बांधकाम स्थापत्यशास्त्राचा उत्तम नमुना मानलं जातं. विहिरीच्या आतील बाजुस उर्दू भाषेतील शिलालेख आहे. या विहिरीला तीन कालवे आहेत. यातील एक नैर्ऋत्य, दुसरा आग्नेय तर तिसरा उत्तर दिशेला आहे. कधीही न आटणाऱ्या या खजाना विहिरीच्या बांधकामासाठी चुना आणि दगडाचा वापर केलेला असून, ही विहीर मलिक अंबर यांच्या काळात बांधलेली असावी, असा अंदाज आहे. मध्ययुगीन काळात पैसा किंवा धन जपून ठेवण्यासाठीही विहिरींचा उपयोग केला जात असावा. त्यामुळे या विहिरीस खजाना विहीर नाव पडलं असावं, असे इतिहासकारांचे म्हणणे आहे.
 सोळाव्या शतकात मराठवाड्यावर निजामांची सत्ता होती. त्या काळात शेताला पाणी पुरवठा करण्यासाठी अहमदनगरचा राजा मुर्तूजा खान याने बीडचा तत्कालीन सरदार सलाबत खान याला खजाना देऊन इथं एक विहीर बांधायला सांगितली. त्या काळचा प्रसिद्ध वास्तूशास्त्रज्ञ राजा भास्कर याने इ.स. १५७२ मधे ही विहीर बांधली. मुर्तूजाशाहकडून आलेला सगळा खजिना या विहीरीसाठीच खर्च झाला, म्हणून या विहीरीला 'खजिना विहीर' म्हणतात.
जमीन पातळीपासून विहीरीची एकूण खोली ७ मी. आहे. जमीनीपासून ४.७ मी. खोलीपर्यंत विहीरीचा आतील व्यास १९ मी. इतका आहे. आणि त्या खाली विहीराचा मूख्य व्यास १२.६० मी. एवढा आहे. विहिरीच्या बांधकामासाठी चूना आणि दगडाचा वापर केलेला आहे. जमिनीपासून १७ फुटांवर विहिरीत गोलाकार ओरांडा आहे, त्यावर आपण सहज फिरू शकतो. तिथे बसण्यासाठी तीन दगडी बाकडेही बांधलेले आहेत. या विहिरीचं पाणी कायम चार फूट इतकंच असतं आणि ते कधीच आटत नाही.
बोगदा

या विहिरीला तीन बोगदे आहेत. यातील एक नैऋत्य, दुसरा आग्नेय तर तिसरा उत्तर दिशेला आहे. नैऋत्य आणि आग्नेय दिशेला असलेले बोगदे हे ह्या विहीरीचे इनलेट आहेत. या दोन बोगद्यांद्वारे विहिरीत पाणी येतं. तर उत्तर दिशेचा बोगदा हा आउटलेट आहे. यातून हे पाणी बाहेर जातं. विहिरीतला उत्तर दिशेचा बोगदा हा एक कालवा आहे. त्या काळात शेताला ह्याच कालव्याद्वारे पाण्याचा पुरवठा व्हायचा. या कालव्याद्वारे बीड शहरातील बलगुजर भागापर्यंत अजूनही पाणी येतं. या कालव्यातून येणाऱ्या पाण्यामुळे या भागातील साडेचारशे एकर शेती कुठलेही उपकरण न वापरता सिंचनाखाली आहे.
विहिरीतून जाणाऱ्या भूमिगत बांधीव कालव्याला हवा पुरवठ्यासाठी या कालव्यावर अंतराअंतरावर दगडी चिरेबंदी स्वरुपात 'झडपा' बांधलेल्या आहेत. ह्या एखाद्या छोट्या आडासारख्या दिसतात. त्यांची खोली १५ फूट ते १६.५ फूट इतकी तर त्यांचा व्यास २ फूट इतका आहे. यात उतरायचीही व्यवस्था केलेली आहे. पूर्वी लोकं यातून पोहत पलीकडे निघायची. आजही या पाण्याचा प्रवाह कायम आहे. यातून येणारं पाणी अतिशय स्वच्छ आहे. अडीच कि.मी. लांबीच्या भूमिगत कालव्यावर अशा एकूण ५३ झडपा आहेत. हे सगळं पाणी भूमिगत म्हणजे जमिनीच्या खालून जवळपास ३ किमी पर्यंत कालव्याने शेताला पोचवण्याचं तंत्रज्ञान आश्चर्यचकीत करणारं आहे !
झडप

पण आज ही वैभवसंपन्न विहीर एका मोठ्या संकटात सापडली आहे. विहीर बघायला येणारे पर्यटक बिलकूलच स्वच्छता बाळगत नाहीत. विहिरीच्या पाण्यात बॉटल्स, कचरा वगैरे साचत आहे. विहिरीपर्यंत जायला पक्का रस्ता नाही. यावरून सरकारचं या जलवास्तूबद्दलचं दूर्लक्ष दिसून येतं. विहिरीला तातडीने संरक्षण व संवर्धनाची गरज आहे. शिवाय दुष्काळामुळे विहिरीची सिंचन क्षमता दिवसेंदिवस कमी होत चालली आहे. वाढत्या कन्स्ट्रकशन्समुळे ह्या कालव्याच्या झडपा बुजत आहेत. शहराजवळून जाणाऱ्या रेल्वेमार्गामुळे ह्या कालव्याचं शेवटचं टोक 'फुटका नळ'ही उध्वस्त केला असून पुढे शेताला जाणारं पाणी नदीत वळवलं आहे. याने विहीराचं आणि शेतीचं नुकसानच झालं आहे.
माहूर शहरातील ‘बारव’ स्थापत्यशास्त्राचा उत्कृष्ट नमुना :-

विदर्भातील बारवा :-

 विदर्भात प्राचीन काळात बांधकाम केलेल्या अनेक बारव आहेत. विविध कालखंडात बांधण्यात आलेल्या या बारवचे बांधकामही पाहण्यासारखे आहे. मात्र, सध्या त्याकडे दुर्लक्ष असून, त्यांची पडझड होत आहे. सध्या सर्वत्र पाण्याचे दुर्भिक्ष्य जाणवत असल्याने शासनाने गावागावांमध्ये असलेल्या या बारवचे खोलीकरण करून दुरूस्ती केली तर पाण्याची टंचाई निवारण्यास मदत होईल तसेच त्यांचे संवर्धनही होईल.
पुतळा बारव , सिंदखेड राजा, बुलढाणा...
   सिंदखेडराजा. रास्ट्रमाता जिजाऊसाहेबांच जन्मगाव. या गावात आनेक ऐतिहासिक वास्तू आहेत पण या गावातील पुतळा बारव ही स्थापत्यकलेच्या दृष्टीने अत्यंत महत्वाची बारव आहे. विदर्भातील सर्वात सुंदर बारव पैकी एक पुतळा बारव असावी. कारण बारव मध्ये अत्यंत सुंदर रेखीव कोरीव मुर्ती आणि नक्षीदार शिल्प आहेत. पुतळा बारव ही एक पुष्करणी असून (पुष्करणी:-विहिरीतील पाण्याच्या पातळीपर्यंत पोचण्यासाठी पायऱ्या असलेली विहीर. जुन्या काळी अशा विहिरी बांधण्याची पद्धत होती. राजस्थानमधील पुष्कर या गावी अश्या प्रकारची पहिली विहीर बांधली गेली, म्हणून हे नांव पडले.) ही अष्टकोनी बारव आहे. या बारवेच्या भिंतीवर असलेल्या सुंदर मुर्तींमुळे या बारवचे नाव पुतळा बारव पडले असावे. पुतळा बारव अकराव्या शतकातील असावी असा उल्लेख आढळतो. पण सध्या स्थिती खूप दुर्लक्षित झालेली आहे कारण या बारवची खूप पडझड झालेली आहे.
       पुतळाबारव ‍साधारण चौरसाकार असून या मध्ये उतरायला तिन बाजूने पाय-या बांधल्या आहेत.( कदाचीत चारही बाजूने असतील पण चौथी बाजू काळाच्या ओघात जमिनदोस्त झाली असावी. किवा कोणती नोंद सापडतेका ते बघाव लागेल. सध्यातरी तीनच मार्ग  दिसतात. चार कोपरे आणि बाजूला आधारस्तंभ खांब होते. ज्यावर छत हे टिकून होते तर छताचा काही भाग सूर्यप्रकाश येण्याकरिता मोकळा होता.
     ही जया प्रकारची बारव असून या बारवेच्या चारही वरच्या बाजूने विविध प्रकारचे दगडी शिल्प कोरली आहेत. या बारवेत सर्वत्र साजशृंगार करणा-या यक्षिणीं / सुरसुंदरीचे  पुतळे कोरले आहेत .या पुतळ्यांमूळेच या बारवेला पुतळा बारव म्हंटले जाते. बारव शिल्पस्थापत्य कलेतील ही बारव पुरातत्व विभागाने संरक्षित बारव म्हणून याची नोंद करावी असे वाटते. आनेक प्रकारच्या यक्षिणी , सुरसुंदरी ,गणपती , किर्तिमूख, कोरीव व घडीव शिल्प अस्ताव्यस्त पडले आहेत. या बारवेच संर्वधन करणे गरजेच आहे.
समुद्रमंथना अवतरली देवांगना l
सुरसुंदरी सज्ज मनोरंजना. ll
       कधी काळी या पुतळा (सुरसुंदरी)  शिल्पांवरून अोळखली जाणारी पुतळा बारवेच सौंदर्य आज लयास जात आहे. याच सुरसुंदरींनी साज शृंगार करून आपल्या सौंदर्याने या बारवेच सोंर्दय वाढवल होत. आज त्यांच्या नशीबी रस्त्याच्या बांधावरचे दगड म्हणून वापर केला जातो. अशाच सुरसुंदरी अर्ध्या जमिनीत गाडलेल्या व इतरस्त विखुरलेल्या.
      परकीय आक्रमणे आणि स्थानिक लोकांच्या हव्यासापोटी भारतातील बहुतेक ऐतिहासिक वास्तू या जीर्ण झाल्यात. राजघराण्यातील स्त्रीयांसाठी स्नानासाठी या पुतळा बारवचा उपयोग होत. जर डोळ्यापुढे संपूर्ण बारवेची वास्तू उभी केली तर असे लक्षात येते की बारवेच्या आतल्या बाजूने वेगवेगळ्या देवींदेवतांच्या मुर्ती असणाऱ्या देवळ्या होत्या त्यातल्या काही देवळ्या अजूनही आहेत परंतु त्यातील सुंदर मूर्ती ह्या पडझडीमुळे तुटल्या तर काही चोरीस सुद्धा गेल्या आहेत.  पुतळा बारव ही सौंदर्याने नटलेली असून सुध्दा कायम  अपरिचित व दुर्लक्षित राहिली आहे. या दुर्लक्षितपणा मुळे आज ही बारव व त्यावरील शिल्प नष्ट होण्याच्या मार्गावर आहे.

निळकंठेश्वर बारव, सिंदखेड राजा, बुलढाणा
सिंदखेड राजा येथे असलेल्या दोन हेमाडपंती मंदिरापैकी एक निळकंठेश्वर मंदिर. या मंदिरासमोर एक भली मोठी तलावाएवढी बारव आहे. हि बारव राजे रावजगदेवराव जाधव यांनी बांधल्याचे सांगितले जाते. 23 मीटर × 23 मीटर प्रशस्त दगडी बारव आहे. ही बारव 28 उतरत्या पायऱ्यांनी बनलेली असून खोली जवळपास 9 मीटर आहे. मंदिराच्या आवारात एक भलेमोठे तुळशी वृंदावन आहे. या मंदिरामध्ये संपूर्ण पाषाणातून साकारलेले श्रीविष्णुचे सुंदर कोरीव शिल्प आहे. बारव च्या परिसरात तीन मोठे शिवलिंग आहेत. तसेच शनी मंदिर आहे.



सजना बारव (पायरी विहीर), सिंदखेड राजा, बुलढाणा
माँ जिजाऊ यांचे जन्मस्थान सिंदखेड राजा येथे अनेक ऐतिहासिक वास्तू आहेत. त्यापैकी एक सजना बारव. ही बारव राजे लखुजी जाधव यांच्या काळातील आहे. ऐतिहासिक चांदणी तलावाजवळ ही बारव आहे. विहिरीत प्रवेशासाठी पायऱ्या बनवलेल्या असून विहिरीवर दोन ओवऱ्या काढून स्नानगृहाची व्यवस्था केलेली आहे.

 






सजना बारव , सिंदखेड राजा , बुलढाणा...
मोती तलाव आणि बारव, सिंदखेड राजा, बुलढाणा
जलयांत्रिकीचा उत्कृष्ट नमुना असलेला मोतीतलाव! त्याकाळी जगदेवराव जाधवांनी सहा लक्ष रुपये खर्चून हा तलाव बांधला होता. २५८ मीटर लांब आणि साडेतीन मीटरपासून अठरा मीटपर्यंत रुंद भिंतीचा हा तलाव आहे. तलावाच्या भिंतीला एक चौकोनी वास्तू आहे. पायर्या उतरुन आत प्रवेश केल्यानंतर एक प्रशस्त किल्ल्यासारखी वास्तू नजरेस पडते. तिथे आणखी खाली तळमजल्यावर जाण्यासाठी पायर्या आहेत. एक षटकोणी रस्ता सुध्दा आत जातो पण तो बंदिस्त आहे. येथून तलावात जाण्यासाठी रस्ता आहे. तलावाचे सौंदर्य न्याहाळण्यासाठी खिडकी आहे. आजही सिंदखेडराजा नगराला तात्पुरता नळपाणी पुरवठा या तलावातून केला जातो.




पुरातन बारव, देऊळगाव राजा, बुलढाणा :- 

पहिली बारव
    देऊळगावराजा गावाच्या थोड्या बाहेर हि बारव आहे. गावातील लोकांना विचारात आपण तिथे पोहोचतो. रस्त्याला उजव्या बाजूला एकाच्या खाजगी जागेत बारव आहे. तिथे त्याची शेती आणि घर दोन्ही आहे. बारव मोठाची विहीर सारखी आहे आणि त्याला जाण्यासाठी पायऱ्या आहेत. काही पायऱ्या उतरून दोन्ही बाजूला छोटी देवड्या आहेत त्यातील एका देवडीच्या बाजूलाच भिंतीवर एक शिलालेख आहे. 

दुसरी बारव आणि प्राचीन समाधी 
    हि बारव अगदी ५  ते १० मिनिटाच्या अंतरावरच पुढे एका शेतात आहे. बारव आणि प्राचीन समाधी आहे. समाधी बहुतेक कोणी सरदार किंवा राज घराण्यातील व्यक्तीची असावी. त्यामुळे तिची डागडुजी चांगली ठेवली आहे. पण बारव दुर्लक्षित आहे, त्यामुळे पूर्ण झाडा झुडपाने झाकलेली दिसते. तसेच विहिरीच्या बाजूला असलेल्या मोठा जवळ काही घरासारख्या अवशेषची भिंत ढासळलेली दिसते. ही बारव, पहिल्या बारव सारखीच दिसते, पण आकाराने लहान दिसते. बहुतेक त्याकाळी बारवचे पाणी समाधी समोर असलेल्या चौकट मध्ये सोडत असावेत. सुशोभिकरण साठी. हि बारव बघून पुन्हा गावात बालाजी मंदिराच्या बाजूला असलेली बारव बघता येईल.

बालाजी मंदिरा शेजारी असलेली बारव आणि दरवाजा आणि तटबंदी

बालाजी मंदिराच्या बाजूला लागून रस्त्यालाच बारव आहे.

रस्त्याचा बाजूला १० ते १२ फुटाची भिंत असल्यामुळे दिसत नाही, पण त्या भिंतीला सीमेंटच्या दोन छोट्या चौकनी खिडकी आहेत, त्या मधून थोडीशी दिसते. त्या भिंतीच्या दोन बाजूला बारव मध्ये जायला पायऱ्या आहेत. पण तिथे लोकांनी कचरा आणि अडगळ ठेवली आहे.
   बारव खूप सुंदर आहे. बारवच पाणी थोडं स्वच्छ आहे. त्यात पाईप टाकलेले आहेत, त्यावरुन ते पाणी वापरात आहे. बारवला दोन बाजूने दरवाजा आहेत. तसेच बारवच्या थोडीशी मध्ये अशी, एक मजली दगडी इमारत आहे, त्याचावर बहुतेक नंतर बारीक विटांने अजून एक मजला (बहुतेक नंतर बांधलेला दिसतो) आहे. त्या मजल्यावर जाण्यासाठी भुयार सारख्या पायऱ्या आहेत. तिथून वर गेले असता आपल्याला वरुन बारव दिसते पण पूर्ण दिसत नाही. आणि तेथे वर जुन घर आहे. मंदिराच्या आजूबाजूच्या पूर्ण परिसरात आपल्याला जुनी वाड्यासारखी घर दिसतात. ह्या वरुन अंदाज लावता येतो. त्याकाळी  ह्या बारवच पाणी प्यायला वापरत असावेत.
    बारवच्या पुढे, रस्त्याला समोर दरवाजा आहे. आणि बाजूला थोडी फार तटबंदी दिसते. त्याकाळी एक प्रवेश द्वार असावे.
बाकी नामशेष झालेली दिसते. मंदिराच्या समोरच एका छोट्याशा गल्लीत वाडा आहे. वाडा सध्या आतून पूर्ण ढासळलेला आहे, फक्त बाहेरून भिंती चांगल्या दिसतात.
 
श्री बालाजी महाराज मंदिर परिसरात असलेली पुरातन बारव विहीर. मंदिराला लागुनच ही सुंदरशी पण वेगळ्याच धाटणीची पुष्करणी आहे. घडीव दगडात बांधलेली हि पुष्करणी चारही बाजुंनी बंदीस्त असुन आत उतरण्यासाठी दोन बाजुना तटभिंतीत पायऱ्या आहेत. जवळपास ४० फुट खोल असलेल्या या पुष्करणीत खाली तीस फुटावर एका बाजुस ओवऱ्या आहेत. नेहमी पाहण्यात असलेल्या पुष्करणीहुन वेगळी असलेली हि पुष्करणी आवर्जुन पहावी अशीच आहे. दरवर्षी ही महाशिवरात्री ला संस्थान तर्फे भाविक भक्तांसाठी खुली केली जाते.




 अंजनीची बारव
अंजनी लोणार पासून सुलतानपूर मार्गे १६.९ कि.मी आहे. आपण तिथे साधारण अर्ध्या तासात पोहोचतो. बारवेच्या एका बाजूला छोटा मंडप दिसतो. बाकी बारवच्या तीन बाजूला पायऱ्या आहेत.
अंजनीची बारव
अंजनीची बारव
रान बारव, लोणार, बुलढाणा
रान बारव म्हणजे रानात, शेतात असणारी बारव होय. लोणार मध्ये असणार्या अनेक पुरातन वास्तू पैकी ही एक बारव आहे. ही जया बारव आहे, जया बारव म्हणजे ज्या बारवेला तीन बाजूंनी पायर्या असतात. ही आयताकृती बारव लोणार मध्ये मोठा मारुती मंदिराजवळच एका शेतात आहे आणि खाजगी आहे. 




 रामकुंड बारव, लोणार, बुलढाणा
जगप्रसिद्ध लोणार सरोवराच्या सभोवताल खूप प्राचीन मंदिरे आहेत त्यापैकी एक सर्वात सुंदर म्हणजे रामगया मंदिर. प्रभु श्रीराम वनवासात असताना येथून गेले म्हणून या मंदिराला 'रामगया' म्हणुन ओळखले जाते. रामगया मंदिराच्या बाजूला उत्खननात एक चतुष्कोणी बारव सापडली. तिला रामकुंड किंवा पुष्कर तिर्थ म्हणून ओळखले जाते. असे सांगितले जाते की प्रभु श्रिरामांनी आपल्या बाणांच्या साहाय्याने या कुंडात गौतमी गंगा प्रकट केली होती. याच कुंडात रामांनी आपले पिता दशरथ राजा यांचे श्राद्ध केले होते. म्हणून आजही लोणार घाटावर कित्येक जमातीचे लोक शतकानुशतके दहासी (तेरसे) पिंडदान करत आले आहेत.



पुरातन शिव मंदिर, नागझरी, बुलढाणा
बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेड राजा तालुक्यातील निसर्गरम्य परिसरात वसलेले एक प्राचीन शिवालय. मंदिराचे बांधकाम हेमाडपंथी शैलीत असून मंदिराची पडझड झालेली आहे. गाभाऱ्यात पंचमुखी शिवलिंग स्थापित आहे. मंदिराच्या जवळच एक गोमुख कुंड आहे. गोमुखातून सतत पाणी वाहत असते. परिसरात एक छोटा धबधबा सुद्धा आहे.









पुरातन पायविहिर, कुरणखेड (काटेपुर्णा), अकोला
मॉ चंडिका देवी मंदिराच्या पायथ्याला ही पाय विहीर आहे , अष्टकोनी आकारात असलेल्या या पायविहिरीच्या पायऱ्या पुन्हा बांधल्या जात आहेत , व खोली वाढवली जात आहे .



 पुरातन बारव आणि अष्टविनायक, कुपटा, वाशिम
वाशिम जिल्ह्यातील मानोरा तालुक्यातील कुपटा या गावात दोन पुरातन मंदिरे आहेत. एक हेमाडपंथी मंदिर गावाबाहेर आहे तर दुसरे शिव मंदिर गावात आहे. या मंदिराशेजारी एक सुंदर बारव आहे. या बारवेला आत उतरण्यासाठी चारही बाजूने पायऱ्या आहेत. प्रवेशमार्गाच्या दोन्ही बाजूस देवकोष्ठ आहेत आणि त्यात सुंदर गणेश प्रतिमा आहेत









परतूर येथील वापी (बारव ) शिलालेख !!!!!
उपलब्धि व स्थळ:- हा शिलालेख जालना जिल्ह्यातील परतूर तालुक्याच्या ठिकाणी महंमद अली रोड वर मुख्य रस्त्यालगत असलेल्या महादेव मंदिराच्या शेजारच्या बारवेच्या पायऱ्या उतरताना उजव्या बाजूस वरच्या थरावर एका शिळेवर कोरलेला आहे .सदर शिलालेख हा उठाव स्वरूपाचा असून तीन ओळीचा देवनागरी लिपीतील मराठी –संस्कृत मिश्र भाषेत आहेत .लेखाची शिळा आयताकृती असून त्यावरील अक्षरे सुवाच्च एक सारख्या आकाराची कोरलेली आहेत .लेखाच्या प्रत्येक ओळीत सुरुवातीला व शेवटी उभे दंड दिले असून काही ठिकाणी विसर्ग देखील दिले आहेत .अनेक वर्ष लेख उघड्यावर असून त्यावर वातावरणाचा परिणाम झाला असून काही अक्षरे थोड्या प्रमाणात झिजली आहेत .तरी देखील लेख स्पष्टपणे दिसून सहज वाचता येतो
===================================
शिलालेखाचे वाचन :
१.||श्री सुत :श्री व्यंकटेश सहित: शांडिल्य गोत्रज:|
२.||वासुदेवा सिध(व)श्व के(क्ते) सुधा सागर वापि कां ||
३.|शके १६२४ चित्रभानौ अक्षय तृतीयाशी || श्री ||
अर्थ : शालिवाहन शकाच्या १६२४व्या वर्षी चित्रभानु सवंत्सरात वैशाख शुद्ध तृतीया .म्हणजेच १९ एप्रिल १७०२ अक्षय तृतीया शुभ मुहूर्तावर रविवार या दिवशी व्यंकटेशाच्या पुत्राबरोबर शांडिल्य गोत्री वासुदेव यांनी अमृतासारखे पाणी असणारी वापी (बारव) बांधली.
===================================
शिलालेखाचे महत्व :- , शिलालेखाची शिळा गुळगुळीत असून त्यावरील अक्षरे देखील सुबक असून एकसारखीच आहेत . शिळेवर पहिल्या ओळीच्या सुरवातीला व शेवटी उभे दंड दिले आहेत. श्री व्यंकटेश सहित शांडिल्य गोत्र असलेले वासुदेव यांनी अमृतासारखे पाणी असलेली बारव बांधली आहे . त्यांनी लोकांच्या सेवेकरिता पिण्याचे पाण्याची व्यवस्था करून एक सामाजिक व लोकहिताचे पुण्यकार्य केलेले आहे .अठराव्या शतकात एखाद्या पुरुषांनी पुढाकार घेवून ईश्वर कृपेने प्रयत्न करून बारवे सारखे एक जलतीर्थ निर्माण करणे ही एक विशेष बाब आहे .एक भव्य बारव बांधून तेथील जनसामान्य करिता जनहिताचे .सामाजिक ,धार्मिक ,जल निर्मितीचे पुण्य कार्य करून ती माहिती शिलालेख स्वरूपात करून सर्वासमोर ठेवणे हेच या शिलालेख चे विशेष महत्व आहे
===================================
अक्षय तृतीया मुहूर्त :-अक्षय तृतीया हा हिंदू आणि जैन धर्मातील एक महत्त्वाचा सण आहे. या दिवशी केलेले कार्य, दान आणि उपवास अक्षय (अविनाशी) मानले जातात, म्हणूनच याला अक्षय्य तृतीया म्हणतात. . हिंदू दिनदर्शिकेप्रमाणे वैशाख शुद्ध तृतीया या दिवशी अक्षय्य तृतीया येते. अक्षय्य तृतीया साडेतीन मुहूर्तांपैकी एक शुभमुहूर्त समजला जातो. या दिवशी दान-धर्म करणे, विशेषतः पांढऱ्या वस्तूंचे दान करणे शुभ मानले जाते.व देवी लक्ष्मी आणि विष्णूजींची पूजा करण्याची प्रथा आहे, ज्यामुळे घरात धन आणि समृद्धी येते, जो मनुष्य या दिवशी गंगा स्नान करतो, तो पापांतून मुक्त होतो, अशी धारणा आहे. या दिवशी केलेले कार्य नेहमीच शुभ आणि सकारात्मक परिणाम देतं, असं मानतात. अक्षय तृतीया हा धार्मिक आणि सांस्कृतिकदृष्ट्या खूप महत्त्वाचा दिवस आहे, जो विविध प्रकारे साजरा केला जातो.
===================================
गावाचे नाव : मु पो.परतूर ता.परतूर , जि. जालना
जी.पी.एस. :१९ .५९ ” ५४. ९३ ,७६.२१ ’’६८ ’७६
शिलालेखाचे स्थान :- बारवेच्या पायऱ्या उतरताना उजव्या बाजूस वरील थरावर कोरला आहे.
अक्षरपद्धती : उठावाचा स्वरूपाचा लेख आहे
भाषा : देवनागरी लिपी मराठी संस्कृत मिश्र भाषा
प्रयोजन : वापी (बारवेचे) बांधकाम पूर्ण झालेची स्मृती जपणे .
मिती / वर्ष : –शके १६२४ चित्रभानु नाम संवत्सरी वैशाख शुद्ध तृतीया
काळ वर्ष : १८ वे शतक -१९ एप्रिल १७०२ रविवार.
कारकीर्द :-औरंगजेब –महाराणी ताराराणी कालखंड
व्यक्तिनाम : श्री व्यंकटेश ,वासुदेव
शिलालेखाचे वाचक : श्री .अनिल किसन दुधाणे .
संक्षेप :- का.काम,
संदर्भ -(IE VI -२०६ )





अक्षय तृतीयाच्या शुभ मुहूर्तावर वापी (बारव) बांधलेला एक नवीन शिलालेख!!!!!!!

बाहुली विहिर -

महाराष्ट्रासारखा ज्वलंत इतिहास व ऐतिहासिक वारसा क्वचितच कुठल्या राज्याला लाभला असेल. परदेशात ऐतिहासिक स्थळ अप्रतिमरित्या सांभाळली जातात व अडगळ नाहीशी केली जाते. परंतु, आपल्याकडे अडगळ जपून ठेवत ऐतिहासिक वारसा वाऱ्यावर सोडला जातो. याचेच उदाहरण म्हणजे "स्मार्ट सिटी' म्हणून विकसित होणाऱ्या नागपूर शहरापासून अवघ्या हाकेच्या अंतरावर असलेल्या वेळा-हरिश्‍चंद्र गावाच्या परिसरात असलेल्या ऐतिहासिक "बाहुली विहीर' आहे.




















अमरावती-जबलपूर मार्गावरील वेळा-हरिश्‍चंद्र गावाच्या परिसरात प्राचीन दगडांपासून बनविलेली बाहुली विहीर म्हणजे प्राचीन स्थापत्यकलेचे उत्कृष्ट आणि जिवंत उदाहरण आहे. प्राचीन रेखीव काम आणि त्यावर देवी-देवतांचे कोरीव काम असलेल्या ऐतिहासिक विहिरीला एक मोठा इतिहास असल्याचे जुने-जाणते लोक सांगतात. आता या ऐतिहासिक वास्तूला विकासाची आणि सौंदर्यीकरणाची "तहान' लागलेली आहे. विहिरीची तहान वेळीच भागविल्या न गेल्यास सुमारे 150 ते 200 वर्षे जुना ऐतिहासिक वारसा लवकरच इतिहासजमा झाल्याशिवाय राहणार नाही.
अंदाजे 25 फूट खोल असलेल्या विहीरमध्ये उतरण्यासाठी जवळपास 50 पायऱ्या बनविण्यात आलेल्या आहेत. याच विहिरीतून परिसरातील शेतीला मोटीच्या साहाय्याने पाणी दिल्या जात असल्याचे गावकरी सांगायला विसरत नाहीत. काही वर्षांआधीपर्यंत परिसरातील आजूबाजूला असलेल्या कित्येक गावांची तहान हीच विहीर भागवित होती. आता लोकांसह प्रतिनिधींनी व सरकारी अधिकाऱ्यांनी दुर्लक्ष केल्यामुळे या ऐतिहासिक विहिरीला उतरती कळा आलेली आहे.
बाहुली विहिरीला सध्या विकासाची आणि सौंदर्यीकरणाची गरज आहे. प्रशासनाद्वारा वेळीच दखल घेऊन विहीर व परिसराचा पर्यटनस्थळ म्हणून विकास केल्यास या ऐतिहासिक वारशाचे अस्तित्व कायम राहणार आहे. जो समाज इतिहास सांभाळतो तोच सुसंस्कृत आणि समृद्ध समजला जातो. "स्मार्ट सिटी' म्हणून विकसित होणाऱ्या उपराजधानीच्या हाकेच्या अंतरावर लाभलेला ऐतिहासिक वारसा जतन करणे गरजेचे आहे.
इतिहास पुसल्या जाण्याची भीती
ऐतिहासिक बाहुली विहिरीला सध्या अवकळा आलेली आहे. विहिरीवरील दारे, खिडक्‍या तुटल्या असून, भिंती मोडकळीस आलेल्या आहेत. आज विहिरीच्या परिसरातील प्राचीन दगड आणि कित्येक वस्तू चोरीला जाण्यास सुरुवात झाली आहे. विहीर आज पूर्णपणे गढूळ पाण्याबरोबरच प्लॅस्टिक, आजूबाजूचा कचरा, निर्माल्याने भरलेली असल्याने विहिरीची दुरवस्था झालेली आहे.
"चिअर्स' अन्‌ "लवर्स पॉइंट'
शहरापासून हाकेच्या अंतरावर एकांत मिळत असल्याने या परिसरात दिवसेंदिवस जोडप्यांचा सुळसुळाट वाढलेला आहे. दुचाकी व चारचाकी वाहनात पाण्याच्या बॉटल्स, प्लॅस्टिकचे ग्लास आणि दारूच्या बाटल्या आणून सकाळपासूनच इथे काही मद्यपी खास दारू पिण्यासाठी आणि सिगारेट ओढण्यासाठी जमा होतात. विहीर परिसरात कुठेही नजर टाकल्यास रिकाम्या दारूच्या बाटल्या, पाण्याच्या बॉटल्स व सिगारेटची पाकिटे हमखास आढळून येतात.

ऐतिहासिक सात मजली पायविहिर, महिमापूर, अमरावती

अमरावती जिल्ह्यातील महिमापुरात आहे तेराव्या शतकातील वास्तू कलेचा अद्भुत नमुना असलेली सात मजली विहीर. महिमापूरच्या या ऐतिहासिक विहिरीचा आकार चौकोनी आहे. सुमारे ८० फूट खोली. तर रुंदी ४० मीटर बाय २५ मीटर.




 विहिरीत उतरण्यासाठी ८५ पायऱ्या. त्या पायऱ्या आताशा खचू लागल्या आहेत. पायऱ्यांच्या मार्गावर किल्ल्याच्या प्रवेशद्वारासमान कमानी आहेत. प्रवेशद्वारावर दोन पुष्पे दगडात कोरलेली. आत शिरल्यावर विहिरीच्या चारही बाजूंनी फिरता येईल, बसता येईल, अशी व्यवस्था आहे. बांधकाम संपल्यानंतर तळाशी चहुबाजूंनी ओट्यासमान रचना. आता या विहिरीला पाणी नसल्याने अगदी तळाशीदेखील जाणे शक्य आहे.

पुरातन पायविहीर, बार्शीटाकळी, अकोला

अकोल्यापासून फक्त पंधरा किलोमीटर अंतरावर असणारी ही प्राचीननगरी बार्शीटाकळी. यादव, वाकाटक आणि मुघल साम्राज्याचे साक्षीदार असणारे, कुण्याकाळी बाजारपेठ, व्यापाराचे मोक्कयाचे ठिकाण असणारे सध्याचे तालुक्याचे गाव. असंख्य तळघरे व भुयारांची श्रुंखला असल्याने हे 'भुयारीशहर' म्हणूनही ओळखल्या जाते. येथे असे म्हणतात, की प्रत्येक गल्लीत दोनतीन तरी तळघरे मिळतात. यापूर्वी आपण बघितले की, मुघल सरदार हसन बार्शी यांच्या नावावरून बार्शी असे नाव पडले, मात्र पूर्वीच्याकाळी येथे बारा वेशी होत्या आणि त्यामुळेच या भागाचे नाव बार्शी असे पडले असावे असेही ऐकण्यात आले आहे. त्याकाळी वाकाटक साम्राज्याची पश्चिम राजधानी म्हणून ओळखल्या जाणारे 'वत्सगुल्म' म्हणजेच आत्ताचा वाशीम जिल्हा. वाशीम जिल्हा आधी अकोल्या जिल्ह्याचाच भाग होता,1998 मध्ये अकोल्यातुन विभाजित होऊन स्वतंत्र जिल्हा झाला. प्राचीन काळापासूनच या राजधानीच्या व्यापाराचा मुख्यमार्ग हा बार्शीटाकळीहुन जात असे. अकोला, बाळापूर, पिंजर, पातूर यांचा केंद्रबिंदू साधणारे बार्शीटाकळीच्याच माध्यमातून तेव्हाही बाळापूर ते कारंजा व्यापारमार्ग चालायचा. याकरिता भुयारीमार्गांची खास व्यवस्था असायची.याचे उत्तम सोदाहरण म्हणजे येथील भुयारी मार्ग दाखविणारी "तीन मजली पायविहीर".


















पुरातनकाळी जलसंचयाच्या हेतूने ठिकठिकाणी आकर्षक आणि हेतूपूरस्सर बारव, पायविहीरी असायच्याच. ज्यांचा उद्देश केवळ जलसाठा येथवर मर्यादित नसून त्यामध्ये व्यापार तसेंच संरक्षणाच्या, बचावाच्या दृष्टीनेही काही सुरुंग व भुयारीमार्ग रहात असत.
बार्शीटाकळीतील "तीन मजली पायविहीर" देखील भुयारीमार्ग असणारी विहीर आहे. जो मार्ग बार्शीतून थेट बाळापूरला निघतो. याविहिरीत पूर्वी मुघलांची छावणी असायची असे म्हणतात. साधारणतः २४ फुट x २० फुट आकाराचची विहिर असून,आतील बाजूस डाव्या बाजूला दोन मोठ्ठाल्या खोल्या आहेत. खोल्यांमध्येही खिडक्या असून,पायरीपायरीवर दिवेलावणीसाठी देवळ्यांची व्यवस्था पाहायला मिळते. आकर्षक विटांची बांधणी मन मोहून घेते. विटा, चुना, दगड यांच्या साहाय्याने विहिरीचे बांधकाम केलेले आहे. बाराही महीने जलसाठवून ठेवणारी ही विहीर पूर्वीच्या काळी असंख्य गावांची तहान भागवत असे, मात्र आता जरीही पाणी आटत नसले तरीही यातील पाणी पिण्यायोग्य नाही.  ही विहीर इनामदार यांची खाजगी मालमत्ता आहे. विहिरीला सातशे वर्ष झाल्याचे गावकरी सांगितात.
दुर्लक्षित वास्तू खजिन्यांपैकी हाही असाच एक खजिना आहे...असो, विहिरीसमोरच एक पिराचा दर्गा आहे, तेथे त्यांनी आम्हाला आवर्जून दर्शनास नेले. दर्गाही सातशे आठशे वर्ष प्राचीन असून संपूर्ण काळ्या पाषाणतीलच आहे. मोठमोठाल्या काळ्या दगडापासून भक्कम चौथरा बांधलेला आहे. येथे चारही बाजूनी दरवाजे असून वर चौकटीवर पारशी उर्दू भाषेत कोरीव काम आहे. जे ते काय लिहिलंय त्यांना माहिती नाही. दर्गा देखील पांढऱ्या रंगाने रंगवून काढलेला आहे.. 

" पुरातन बारव "तळेगाव दशासर :-

 वरील चित्र पाहिल्यावर कोणालाही वाटेल की , एकतर हे शिल्प गुजरातचे किंवा राजस्थानचे असेल.पण खरे पाहता ही महाराष्ट्रातल्या एका छोट्या शहरवजा गावातील एक बारव आहे.अमरावती जिल्ह्यातील धामनगाव रेल्वे तालुक्यात तळेगाव दशासर या गावामध्ये ही पुरातन आणि भव्य बारव अस्तित्वात आहे.
यादव काळातील  दगडांच्या भिंती असलेल्या विहिरी , देवालयांचे नक्षीयुक्त दगडी खांब, पुष्कर्णा (संस्कृत मध्ये पायऱ्यांच्या विहिरीला पुष्करीणी म्हणतात) विहीर अशा विविध वास्तुंसाठी विख्यात असलेला तळेगाव दशासर परिसर.तळेगाव दशासर गाव अतिशय पुरातन असून यादव काळातील तीन हेमाडपंथी शिवालये आहेत़ ही मंदिरे दगडांनी बांधली असून काळाच्या ओघात ह्या मंदिरांची पडझड झाली आहे.

 येथे छोटे हनुमान मंदिर सुद्धा आहे. त्यावरून या बारव ला "पायऱ्यांचा मारोती" म्हणून ओळखले जाते. मात्र हे मंदिर अलीकडच्या काळात बांधले असून हे मंदिर बांधण्यासाठी सिमेंटचा वापर करण्यात आला आहे. बारव निर्माण करताना मात्र विटा, सिमेंट, रेती, यांचा वापर करण्यात आलेला नाही हे स्पष्ट दिसते. दगड कोरून आणि ते एकमेकांवर ठेवून या विहिरीचे बांधकाम करण्यात आले आहे. या विहिरीसाठी वापरण्यात आलेले दगड हे मध्ययुगीन कालखंडातील आहे. त्या काळात ज्या काही विहिरी मशिदी, दर्गे आणि मंदिरांचे बांधकाम झाले त्या सर्व बांधकामांमध्ये ज्या प्रकारचे दगड वापरण्यात आले, तसेच दगड या पाय विहिरीच्या बांधकामासाठी वापरण्यात आले असल्याचे डॉ. संतोष बनसोड यांनी स्पष्ट केले. यामुळेच ही विहीर मध्ययुगीन कालखंडातील आहे.
 ही पायऱ्यांची विहीर, केशव मंदिर, गावाच्या वेशी बाहेरील तलाव आणी इतर बऱ्याच ऐतिहासिक वास्तू तळेगाव दशासर मध्ये आहेत, ज्या या गावाच्या अभिमानास्पद प्राचीन इतिहासाची साक्ष देतात...हा भाग पूर्वी निजामाच्या ताब्यात होता..इजिप्तच्या वास्तुकलेशी काहीसे साम्य असलेल्या या वास्तुची निर्मिती इ.स ६ मधिल असल्याचं सांगितले जाते. पण नेमका इतिहास नाही. पंरतू या बारव जवळ मारूतीचे देऊळ असल्याने चालुक्याच्या काळात हा बारव तयार केला असावा.
       तळेगाव दशासर या गावात असणाऱ्या दोन्ही पाय विहिरींना बाराही महिने पाणी राहते. हनुमान मंदिरा मागे जी मोठी बारव आहे. त्या बारवच्या निर्मिती दरम्यानच या ठिकाणी महादेवाची पिंड आणि काही दगडांच्या मूर्ती मुर्त्या घडवून ठेवण्यात आल्या आहेत. अनेकदा पावसाळ्यात ही विहीर पाण्याने तुडुंब भरते, तेव्हा महादेवाचे मंदिर पाण्यात बुडून जाते. मुघल काळापासून देशाला स्वातंत्र्य मिळाल्यावर १९७० पर्यंत तळेगाव दशासर परिसरातील रहिवासी याच पाय विहिरीतून पिण्यासाठी पाणी वापरायचे.
       तळेगाव दशासर या गावासह लगतच्या परिसरात लहान-मोठी शेकडो मंदिरे आहेत. या परिसरात चक्क पाण्यावर तरंगणाऱ्या विटा आढळतात. तळेगाव दशासर येथील ग्रामस्थ पाण्यावर तरंगणाऱ्या विटेला खंगरी वीट असे म्हणतात. भगवान श्रीरामाने समुद्रात तरंगणाऱ्या दगडांद्वारे रस्ता बांधला होता. या घटनेकडे वैज्ञानिक दृष्टीने पाहिले तर त्या काळात देखील तळेगाव दशासर परिसरात आढळणाऱ्या विटांप्रमाणेच दगडांची निर्मिती केली असावी  तळेगाव दशासर परिसरात ज्या काही पाण्यावर तरंगणाऱ्या विटा बनतात त्यांची निर्मिती विशिष्ट प्रकारे करण्यात आली. मध्ययुगीन कालखंडात समृद्ध असणाऱ्या या परिसरात धान्य ठेवण्यासाठी कणग्या कडक असायच्या. या कणग्यांमध्ये खालच्या स्तरावर असणाऱ्या ज्वारीला खाली मातीचा ओलावा त्याच्यावर असणारा ढीग त्यामुळे या ज्वारीला हवा लागत नसायची. त्यामुळे ही खालची ज्वारी सडायची. ही कुजलेल्या अवस्थेतील ज्वारी मुरूमयुक्त चिखलामध्ये मिसळून त्यांच्या विटा तयार केल्या जात असत. या विटा भाजल्या जायच्या. या सच्छिद्र विटा पाण्यामध्ये सोडल्यावर त्या पाण्यावर तरंगायच्या. आज देखील अशा प्रकारच्या विटा तळेगाव दशासर परिसरात अनेक ठिकाणी मिळतात
      तळेगाव दशासर परिसरातील प्राचीन शिल्पकलेचा वारसा सांगणाऱ्या मूर्ती आणि इतर पुरातन वस्तू २०२१ मध्ये पुरातत्व विभागाकडून अधोरेखित करून त्या अमरावतीला नेण्यात आल्या. काळा पाषाणातील मूर्ती तसेच काळया पाषाणात कोरलेले खांब यांचा देखील अभ्यास पुरातत्त्व विभागाकडून केला जातो आहे.
या गावात अनेक पुरातन असे वाडे देखील आहेत. गावातील ही विहीर अतिशय प्राचीन असून या विहिरीतून एक भुयारी मार्ग देखील आहे मात्र हा मार्ग नेमका कुठे जातो याबाबत कुठलीही माहिती नाही. आता काही वर्षांपासून हा भुयारी मार्ग बंद करण्यात आला आहे
सुनगांव ता. जळगांव जामोद जि. बुलढाणा बारव
        ही अतिशय सुंदर वेगळ्या बांधणीची बारव आहे. हीचे संवर्धन करण्याची तळमळ गावकर्यांनी बाळगली आहे.




पुरातन पायविहिर, शेलगाव बाजार, मोताळा, बुलढाणा
बुलढाणा जिल्ह्यातील मोताळा तालुक्यात शेलगाव बाजार येथे ही अद्भुत प्राचीन बारव आहे. काळ्या पाषाणातील भव्य बांधकाम थक्क करणारे आहे. शेळगाव बाजार येथे गावापासून अर्धा किमी अंतरावर अमित खर्चे यांच्या शेतात ही पायविहिर आहे. विहिरीची साफसफाई केल्यास ही विहिर एक पर्यटन स्थळ बनू शकेल
















पुरातन बारव, शेगाव, बुलढाणा

संतनगरी शेगाव मध्ये ही पुरातन बारव स्थित आहे. शेगाव - नागझरी रोड वर एका शेतामध्ये ही सुंदर बारव आहे. बारव बाहेरून आयताकृती आणि आत उतरल्यानंतर चौकोनी बांधलेली आहे. बारवेत नेहमी पाणी असते आणि त्याचा उपयोग शेतीसाठी करण्यात येतो. बारवेची थोडी डागडुजी केल्यास शेगाव मध्ये भेट देणाऱ्या भाविकांसाठी हे निश्चितच एक पर्यटन स्थळ बनू शकते.










पुरातन पायविहीर, भिवापूर, नागपूर
नागपूर जिल्ह्य़ातील भिवापूर येथे अतिशय सुंदर अशी ही पायविहीर आहे. विहिरीचे बांधकाम, नक्षीकाम थक्क करणारे आहे. गावातील ग्रामदैवत असलेल्या भिमा देवी मंदिराच्या समोरच ही पुरातन बारव आहे. येथे अशी आख्यायिका आहे की पांडव वनवासात असताना येथे काही काळ वास्तव्यास होते आणि त्यावेळी भिमाने येथे देवीची स्थापना केली होती, त्यावरूनच या देवीचे नाव भिमादेवी असे पडले आहे. गावात एक पुरातन तलाव आहे. येथे किल्ला सुद्धा होता पण तो आता नामशेष झाला आहे. पण ही पायविहीर अजून सुस्थितीत आहे. या विहिरीची साफसफाई केल्यास हे एक पर्यटन स्थळ बनू शकते. आपण सर्वांनी मिळून हा सुंदर वारसा जपला पाहिजे.
(Photo - Bhiwapur Mirchi Vlogs)



















 
 दोन पुरातन बारव, चिंचपूर, खामगाव, बुलढाणा
गाव चीतोडा ता.खामगाव येथे पण खूप मोठी पुरातन बरव आहे







पुरातन पायविहीर, अडेगाव, चंद्रपूर
आपल्या जंगलांच्या आणि वन्यजीवांच्या संरक्षणाविषयी आपण बोलायलाचं हवं. परंतु याचवेळी आपल्याला लाभलेल्या समृद्ध वाराश्याच्या इतर पैलूंकडेही लक्ष द्यायला हवं. या गोष्टी मग केवळ नैसर्गिकदृष्ट्याच महत्त्वाच्या असतील असे नाही तर त्या पुरातत्त्वीय किंवा ऐतिहासिकदृष्ट्याही महत्त्वाच्या असू शकतात.














आपल्या इतिहास आणि वास्तुकलेचं मनोहर दर्शन घडवणारी अशीच एक गोष्ट आहे बारव (Step well). ताडोबातही अशा काही बारवा आहेत. पाणी पुरवठा करण्याबरोबरच या बारवा मंदिर, सामुदायिक केंद्र तसेच व्यापार मार्गावरील विश्रांतीस्थळ म्हणूनही वापरल्या जात असत. बारवीला गुजरातीत वाव, तर हिंदीत बावली किंवा बावडी म्हणतात.
प्रत्येक बारव ही असामान्य अभियांत्रिकी आणि वास्तुकलेचा नमुना असते. प्रत्येक बारवीचा आकार (गोल, चौकोनी, अष्टकोनी किंवा इंग्रजीतील एल या अक्षराप्रमाणे) आणि प्रवेशद्वारांची संख्या वेगवेगळी असते. भारतात हजारो बारवा होत्या परंतु ब्रिटीश काळात एकाच ठिकाणाहून संपूर्ण गाव/शहराला पाणी पुरवठा करण्याची पद्धत सुरू झाल्याने आपल्या या अप्रतिम संरचानांचे महत्त्व कमी झाले. परिणामी आडेगावातील दुसऱ्या बारवेप्रमाणे अनेक बारावा नष्ट करण्यात आल्या.
या बारावांशी अनेक कथा-कहाण्या जोडलेल्या असतात. त्यापैकीच एक आडेगावच्या बारवेशी संबंधित आहे ती अशी की, चंद्रपूरच्या प्रसिद्ध महाकाली मंदिरातून एक 20 किलोमीटर पेक्षा लांब गुप्त मार्ग थेट या बारवेत निघतो!

ढाणकी बारवेची स्वच्छता सुरू...
ढाणकी, ता. उमरखेड, जि. यवतमाळ येथली बारव स्वच्छता मोहिम आज पहाटे सुरू झाली. आठच दिवसांपुर्वी या बारवेचा फोटो मी टाकला होता. Vishnu Fulewar या तरूणाने पुढाकार घेतला. आज बारवेचे काम सुरू झाले. गावोगावचे तरूण असे उत्साहानं बारव बचाव मोहिमेत सहभागी होत आहेत हे मोठे आशादायी चित्र आहे. महाराष्ट्र बारव मोहीम आता सगळ्यांनी मनावर घेतली आहे. यपुढच्यावर्षी महाशिवरात्रीला किमान ५०० बारवांवर दीपोत्सव होवू शकेल अशी आशा निर्माण झाली आहे. ५० बारवा सुंदर पर्यटन स्थळ म्हणुन विकसित होणार आहेत. या मोहिमेत सहभागी असलेल्या सर्वज्ञात अज्ञात व्यक्तींचे मन:पुर्वक धन्यवाद.. साथी हाथ बढाना..
श्रीकांत उमरीकर, महाराष्ट्र बारव बचाव मोहिम, औरंगाबाद, 9422878575.



 ढाणकीची (ता. उमरखेड, जि. यवतमाळ) बारव तरूणांनी काल स्वच्छ केली. त्यांचे मन:पुर्वक अभिनंदन.. स्वच्छ पाण्याने त्यांना आशीर्वाद दिला...

पुरातन पायविहीर, रामटेक, नागपूर









रामकुंड बारव, रामटेक किल्ला, नागपूर
गड मंदिर रामटेक येथे किल्ल्यावर एक पुरातन कुंड (बारव) आहे. ही बारव रामकुंड नावाने ओळखली जाते. बारव आयताकृती असून बारवेत उतरण्यासाठी पाच प्रवेश मार्ग आहेत.









सिता कुंड बारव, रामटेक किल्ला, नागपूर
उंच डोंगरावर असलेल्या किल्ल्यात हा कुंड दगडात बांधलेला असून यात नेहमी पाणी असते.







पुरातन बारव, कुपटा, वाशिम
वाशिम जिल्ह्यातील मानोरा तालुक्यातील कुपटा या गावात दोन पुरातन मंदिरे आहेत. एक हेमाडपंथी मंदिर गावाबाहेर आहे तर दुसरे शिव मंदिर गावात आहे. या मंदिराशेजारी एक सुंदर बारव आहे. या बारवेला आत उतरण्यासाठी चारही बाजूने पायऱ्या आहेत.

 पश्चिम महाराष्ट्रातील बारवा :-

        पश्चिम महाराष्ट्रात बारा मोटेची विहीर (जि. सातारा) किंवा करमाळ्याची कमलाभवानी मंदिराजवळची, ‘सैराट’ या चित्रपटामुळे गाजलेली अष्टकोनी विहीर यांसारख्या देखण्या बारवा आहेत. काही इतक्या छोट्या आहेत, की त्या आकारानेच त्यांचे देखणेपण अजून खुलून येते. 
पुणे जिल्ह्यातील मावळ तालुक्यातील करंजगाव बारव
पुणे जिल्ह्यातील पुरंदर तालुक्यातील मावडी ( कडे पठार ) येथील बल्लाळेश्वर म्म्दीरातील बारव
पुणे जिल्ह्यातील पुरंदर तालुक्यातील जेजुरी येथील बकुळीचा मळा येथील बारव
सातारा जिल्ह्यातील नागेवाडी येथील शांकभरी माता मंदीराजवळील बारव
सातारा जिल्ह्यातील वाई तालुक्यातील पायर्यांची विहीर
पुणे जिल्ह्यातील तळेगाव दाभाडे येथील बाणेश्वर मंदीर येथील बारव'
अहिल्यानगर जिल्ह्यातील पारनेर तालुक्यातील भांडगाव येथील बारव
अहिल्यानगर जिल्ह्यातील पारनेर तालुक्यातील निघोज येथील बारव
अहिल्यानगर जिल्ह्यातील शिरुर तालुक्यातील बेलवंडी कोठार येथील बारव

 रतनवाडीची बारव :-

(श्री अमृतेश्वर महादेव , रतनवाडी, भंडारदरा )

ऋषीचे कूळ आणि नदीचं मूळ कधी शोधू नये असं म्हणतात . पण भारतात नद्यांना मातृत्वाचं स्थान दिलं जातं आणि त्यांच्या उगमाशी संबंधीत मंदिरही उभारली जातात हे विशेष . असंच एक सुंदर मंदिर रतनगडाच्या पायथ्याशी रतनवाडीत आहे ज्याचं नाव आहे अमृतेश्वर महादेव मंदिर आणि त्याचं वैशिष्ट्य म्हणजे ह्या देवळातून प्रवरा नदी उगम पावते असं जाणकार सांगतात .

 अमृतेश्वर महादेव मंदिर , रतनवाडी, भंडारदरा .

 जलमग्न शिवलिंग , अमृतेश्वर महादेव .

वरील प्रकाशचित्रामध्ये शिवलिंग पाण्यात बुडालेलं दिसतं . सर्वसाधारण पणे चारेक महिने ते पाण्यातच असतं . ह्याच संदर्भाने प्रवरा नदी इथून उगम पावते असं म्हणतात .

अमृतेश्वर मंदिराची बारव

जसा मंदिराचा कळस जसा आसमंतात निमुळता होत जातो तशीच बारवही जमिनीत खोल जाताना निमुळती होते म्हणून त्यांना उपडी मंदिरे ( inverted temples )  सुद्धा म्हटलं जातं . बारा महिने पूर्ण गावाला पाणी पुरवठा व्हावा अशा पद्धतीचं जल व्यवस्थापन आणि जलाशयाचं पावित्र्य टिकावं ( बारव मंदिराशेजारी असल्यास त्या पाण्याचा उपयोग खास करून देवळातल्या नित्यकर्मां साठीच केला जाई ) म्हणून केलेले नियम, देवकोष्ठांमध्ये अनेकविध देवांची स्थापना हे बारवांचं वैशिष्ट्य सांगता येईल .
   बारवांचं पावित्र्य जपण्यासाठी त्यात देवकोष्ठांची योजना केली जात असे . देवकोष्ठ म्हणजे दगडात कोरलेले लहानसे कोनाडे ज्यात ह्या देवतांच्या मूर्ती सुप्रतिष्ठीत केलेल्या असतात . ह्यात सर्वांत महत्वाचा देव म्हणजे शेषशायी विष्णू , गणपती आणि ११ रुद्रांची स्थापना .

बारवेतली गणेश मूर्ती .

मूर्तीला शेंदूर फासल्याने त्याचे बारकावे कळून येत नाहीत पण स्वतंत्र देवकोष्ठ, हातातले पाश आणि परशू ही आयुधं, आखूड मांड्या, सापाचं जानवं इत्यादि मूर्ती विशेष दिसून येतात . देवकोष्ठाच्या बाहेर द्वारपालही नजरेस पडतात .

बारवेतील शेषशायी विष्णू मूर्ती, सोबत पायाशी लक्ष्मी, बाहेर सालंकृत द्वारपाल इत्यादी .

श्री विष्णुची मूर्ती आणि बारवेचा निकट संबंध आहे . जलाशय म्हणजे पाणी आणि श्रीविष्णू क्षीरसागरात म्हणजेच पाण्यात शेषनागावरती झोपतात म्हणून बारव असल्यास त्यात शेषशायी विष्णू मूर्ती प्राधान्याने आढळून येते .

११ रुद्रापैकी एक मूर्ती

गणपती आणि विष्णू शिवाय इतर अकरा देव कोष्ठां मधे ११ रुद्रांची स्थापना केलेली दिसते . बाहेर द्वारपाल आणि यक्षांच्या सालंकृत मूर्त्या दिसतात . ह्या बारवेमध्ये सर्व रूद्रांच्या मूर्त्या साधारणपणे सारख्याच दिसतात . काळाच्या ओघात भरपूर झीजही झालेली दिसते.

आयुधांवरून मूर्तीचा वेध घेण्याचा प्रयत्न

मूर्तींच्या उजव्या हातात सर्वप्रथम गदा दिसते मग वरच्या उजव्या हातात सुदर्शन चक्र मग वरच्या डाव्या हातात शंख आणि खालच्या डाव्या हातात अस्पष्ट पणे कमळ दिसते. गचपश म्हणजे गदा, चक्र, शंख आणि पद्म तर अग्निपुराण, पद्मपुराणा प्रमाणे ही माधवाची ( विष्णूचीच ) मूर्ती आहे हे स्पष्ट होते

 खांबपिंपरीचे बारववैभव !

नगर जिल्ह्याच्या शेवगाव तालुक्यातील खांबपिंपरी हे गाव म्हणजे ऐतिहासिक दृष्ट्या मोठा खजिना आहे ! ते गाव पुरातत्त्वीय दृष्ट्या पांढरीच्या टेकाडावर वसलेले आहे. त्या गावातील शिल्पसमृद्ध बारव, शेतात विहिरी खणू लागल्यावर सापडणाऱ्या अनेक प्राचीन वस्तू व घर बांधणीत चार फुटावर पाया खोदल्यावर सापडणारे माणसांचे सापळे या गावाबद्दल अधिकच कुतूहल निर्माण करतात...

वास्तुकलेचा उत्तम नमुना पैठणजवळच्या खांबपिंपरी या निसर्गरम्य गावात उपेक्षित स्थितीत पडलेला आहे. ती आहे एक विहीर– पायऱ्या असलेली विहीर म्हणजे बारव. खांबपिंपरी येथील विहीर, मंदिर आणि सभामंडपाचे अवशेष त्यांचे सौंदर्य टिकवून आहेत. खांबपिंपरी हे गाव नगरपासून शेवगावमार्गे एकोणनव्वद किलोमीटरवर आणि पैठणपासून फक्त सतरा किलोमीटरवर काटकडी नदीच्या काठी वसले आहे. आव्हाणे येथील निद्रिस्त गणपती आणि घोटण येथील मल्लिकार्जुनाचे प्राचीन मंदिर हेसुद्धा त्याच परिसरात आहेत. नगर जिल्ह्यातील खांबपिंपरी हे गाव म्हणजे ऐतिहासिक दृष्ट्या मोठा खजिना आहे ! तेथेच ती शिल्पसमृद्ध बारव आहे. ती पुष्करणी म्हणूनदेखील परिचित आहे.

खांबपिंपरी या नावापासूनच त्या गावाबद्दलचे कुतूहल चाळवले जाते. खांबपिंपरी हे काय प्रकरण आहे ते गावात गेल्यावर समजते. पिंपरी नावाची गावे अनेक आहेत. पण या पिंपरी गावात एक मोठा दगडी खांब उभा आहे ! त्यामुळे ते झाले खांबपिंपरी. पण बोलताना मात्र त्याचा उल्लेख खामपिंपरी असा होतो. हळुहळू, गावाचे ते नाव रूढ होऊन जाईल अशीही शक्यता आहे. गावातील तो खांब प्राचीन मंदिराच्या सभामंडपाचा असावा. तो अंदाजे दहा फूट उंचीचा दगडी झुकलेला असा आहे. त्याला रणखांब असेही म्हटले जाते. महाभारतात अर्जुन व त्याचा मुलगा बभ्रुवाहन यांचे युद्ध झाले होते. त्यावेळी तो रणखांब उभारला अशी दंतकथा सांगत त्या खांबाला महाभारत काळाशीदेखील जोडले जाते. खांबाच्या माथ्यावर हंसांची नक्षी आहे, तो एका चौथऱ्यावर ठेवलेला आहे. ज्या अर्थी तो खांब तेथे आहे, त्याअर्थी तेथे एखादे मोठे मंदिर अस्तित्वात असणार. पण त्याचे बाकी अस्तित्व काही तेथे दिसत नाही. मात्र मूर्तींचे काही अवशेष इतस्तत: विखुरलेले आहेत. गावकरी तसाच आणखी एक खांब जवळच्या लखमापुरी गावात असल्याचे सांगतात. खांबाचा वरील भाग युद्धाच्या वेळी शेजारील लखमापुरी गावात पडल्याची आख्यायिका सांगितली जाते. खांबाजवळ शिवमंदिर असून तेथे गाभाऱ्यात शिवपिंड आहे. नंदीची मूर्ती सभागृहात दिसते. मंदिराच्या खांबांवर कीर्तिमुखे कोरलेली आहेत. खांबांच्या वर उलटे नाग कोरलेले दिसतात. बारव शिवमंदिराला लागून आहे व ते खांबपिंपरी गावाचे वैभव म्हणता येते !

त्या खांबावर कोरीव काम केलेले असून त्यावर सप्तमातृका कोरल्या आहेत. त्याही वैशिष्ट्यपूर्ण आहेत. विशेष बाब म्हणजे सप्तमातृका अन्य ठिकाणी बसलेल्या अवस्थेत आढळतात. मात्र त्या खांबावर त्या उभ्या दर्शवल्या आहेत. तेथे काळभैरवाचे दुर्मीळ शिल्प आहे. तेथील माजी सरपंच लक्ष्मण पावशे म्हणाले, की १९८७ साली तत्कालीन जिल्हाधिकारी यांनी तेथे जाऊन बारव व खांब यांची पाहणी केली होती. त्यावेळी निधी उपलब्ध करून हा ठेवा जतन करू असे सांगितले होते. मात्र निधी मिळाला नाही !

बारव चौरसाकृती आहे. बारवेचा तळ त्याची देखभाल-दुरुस्ती अवघड होत असल्यामुळे मातीने बुजवून बंद केला आहे, मात्र जमिनीपासून पंचवीस फूट खोलीपर्यंत पायऱ्यांच्या माध्यमातून खाली उतरता येते आणि पाहण्यास मिळतात त्या चौसष्ट योगिनी. ते सुंदर कोरीव काम आहे. तो रेखीव मूर्तींचा जणू पटच दिसतो. योगिनी म्हणजे आभाळातून मुक्‍त संचार करणाऱ्या देवता. योगिनी साधना अवस्थेत बसलेल्या असून प्रत्येक मूर्तीच्या हातात जपमाला आहे. मूर्ती सातवाहन, चालुक्य, वाकाटक अशा विविध काळांशी निगडित आहेत. मूर्ती तिन्ही बाजूंनी कोरलेल्या आहेत. स्त्री व पुरुष देवतांच्या अशा मिळून एकोणपन्नास मूर्ती तेथे आहेत. प्रत्येक मूर्तीच्या हातात पाश, त्रिशूळ, फळ अशी विविध आयुधे दिसतात; तसेच, प्रत्येक मूर्तीच्या दोन्ही बाजूंना नर्तिका नाहीतर वादक आहेत. आख्यायिका अशी सांगितली जाते, की त्या चौसष्ट योगिनी रक्‍तबीज दैत्याचा वध करण्यासाठी भूतलावर आल्या होत्या. रक्‍तबीज दैत्याला वर होता, की त्याच्या रक्‍ताचा थेंब जमिनीवर सांडला तर त्यामधून आणखी दैत्य तयार होतील. त्यामुळे त्या योगिनी आकाशातून आल्या व त्यांनी रक्‍तबीज दैत्याचा वध आकाशातच केला आणि त्याच्या रक्ताचा एकही थेंब जमिनीवर पडू दिला नाही. योगिनी हे स्त्री शक्तीचे एक रूप आहे.
बारवेत पाणी नाही. दोन लहान दालने बारवेच्या दोन कोपऱ्यांत आहेत. बारवेच्या दोन भिंती आणि बाजूला दोन खांब उभारून अंदाजे सहा फूट उंचीचे चौरसाकृती मंडप दिसतात. मूर्ती मंडपातसुद्धा कोरलेल्या आहेत. तेथे गणपती, भैरव अशा सुंदर मूर्ती पाहण्यास मिळतात. मूर्तींनी इतकी मढलेली बारव; मात्र तिच्याकडे ना मान्यवरांचे, ना इतिहासतज्ज्ञांचे, ना पर्यटकांचे लक्ष वेधले जात ! महाराष्ट्रातील बऱ्याच बारवांमध्ये देवकोष्ठे (देवाची मूर्ती असलेले कोनाडे) केलेली दिसतात. त्या कोष्ठांमध्ये कधी मूर्ती असतात तर बऱ्याचदा ती रिकामी असतात. परंतु खांबपिंपरी येथील बारवेमध्ये मात्र मूर्तिकला भरभरून अनुभवण्यास मिळते.
बारवेचे महत्त्व आणि कौतुक स्थानिकांना फारसे नसावे. बारवेच्या एका बाजूचे दगड वापरून मारुतीचे मंदिर बांधले गेले आहे. जुने मंदिर पडले होते, सोयीचे म्हणून ग्रामस्थांनी बारवेचे दगड वापरून ते मंदिर उभारले म्हणे. बारवेला त्या बाजूला मूर्ती नव्हत्याच असा युक्तिवाद ग्रामस्थांनी केला. तेथील काही मूर्ती कोणा ‘संशोधका’ने मागितल्या म्हणून ग्रामस्थांनी त्यांना देऊन टाकल्या ! गावाने औदार्य एवढे दाखवले, की त्या कोणाला दिल्या हेदेखील त्या मंडळींना माहीत नाही. बारवेच्या काठावर पुरातन महादेवाचे मंदिर आहे. त्याच्या जीर्णोद्धाराच्या वेळी या बारवेलासुद्धा काही प्रमाणात सिमेंट लागलेले दिसते.  दुसऱ्या कोपऱ्यावर अखंड शिळा आहे. त्यावर भगवान श्रीकृष्ण बासरी वाजवताना दिसतात आणि चारही बाजूंनी गोपिका नृत्य करताना कोरलेल्या आहेत. त्याच शिळेच्या बाजूला महालक्ष्मीचे मंदिर आहे
गाव पुरातत्त्वीय दृष्ट्या पांढरीच्या टेकाडावर (प्राचीन/पुरातन वस्तीची शक्यता असलेले ठिकाण) वसलेले आहे. शेतात विहीर खणू लागले, की अनेक प्राचीन वस्तू जसे की खापरे, मोठ्या आकाराच्या विटा सापडतात (आणि अर्थातच त्या फेकून दिल्या जातात). गावच्या परिसरात कोठेही नवीन घर बांधणे झाले तर त्यासाठी चार फूटाचा पाया खोदला, की माणसांचे सापळे सापडतात ! सर्वत्र सापडणारे हे सापळे गावकऱ्यांच्या अंगवळणी पडले आहेत. त्यामुळे त्यांचे भय वाटत नाही. सापळा ‘निघाला की त्याला नदीमध्ये प्रवाहित करायचे किंवा त्याची योग्य प्रकारे विल्हेवाट लावायची आणि काम सुरू ठेवायचे हे ग्रामस्थांना नेहमीचे झाले आहे.
गावात दोन-तीन जुन्या विहिरी आहेत. कापसाची शेती मोठ्या प्रमाणावर केली जाते; तसेच, बोराची झाडेसुद्धा भरपूर आहेत.

 कुभेफळ बाराव :-

 नैसर्गिक जलस्रोतांचा अभ्यास करून महाराष्ट्र परिसरात अनेक ठिकाणी भक्कम अशा दगडी बारव बांधण्यात आल्या.  अतिशय सुंदर कोरीव बांधकाम ह्या वेळी कारागीरांनी केलेले दिसते.  या सर्व बारव होळकरांच्या काळातील  दगडी बांधकाम असलेल्या या विस्तीर्ण बारवा आजही या परिसरातील नागरिकांची तहान भागविण्याचे काम करतात.
   त्या काळातील बांधकामाचे तंत्रज्ञान निश्चितच आपल्यापेक्षा प्रगत होते. बारवाची संपूर्ण बांधणी दगडांनी केली जायची. आजही त्यातील एकही दगड पडलेला दिसत नाही. त्या वेळी याचा उपयोग पिण्यासाठी, शेतीसाठी,वापरासाठी नागरिक मोठय़ा प्रमाणात करत असत. बारवांच्या बाजूला आजही येथे महादेवांची मंदिरे आढळतात, जेणेकरून पाणी शुद्ध राहणे, तसेच विविध धार्मिक विधी करण्यासाठी याचा उपयोग व्हायचा. त्या काळातील बारव बांधणाऱ्यांना पाण्याचे स्रोत कुठे आहेत याची माहिती होती. तसेच जलपुनर्भरणाचे महत्त्वदेखील त्यांना माहिती होते. या बारवांविषयीचे पुरावे अजूनही इंदौरच्या होळकर दरबारात आपणास बघावयास मिळतात.
Barav
    अकोले तालुक्यातील वाशरे गावात, कुभेफळ गावात तसेच औरंगपूर फाटा जवळ बाराव आहेत. वाशेरे गावातील बाराव आजही गावकऱ्यांची तहान भागवते. कुभेफळ गावालगत असलेली बाराव मात्र अतिशय सुंदर बांधकाम केलेली दिसते परंतु गावाच्या व मनुष्य वस्तीच्या बाजुला असल्याने  जास्त वापर नसल्यानी थोडी दूर्लक्षित आहे. औरंगपूर फाटा जवळ बाराव पूर्णपणे गाडलेली होती परंतु येथील स्थानिकांनी उत्खनन करून  जिर्णोद्धार  केला व गाडली गेलेली गणेशाची मूर्ती  तसेच शिवलिंगाची प्राणप्रतिष्ठा केली. या गावाचे अकोल्यापासूनचे अंतर : वाशरे ७.५ km , कुभेफळ ७.५  km  औरंगपूर फाटा ४.३ km

होळकरकालीन बारव - वीरगाव : ता.अकोले जि.अहिल्यानगर (महाराष्ट्र) 

  वीरगावच्या पश्चिमेला काळ्या-तपकिरी डोंगर रागांच्या सानिध्यात राणी अहिल्यादेवी होळकर यांनी या बारवेचे बांधकाम केले. राणी अहिल्यादेवी होळकर पुण्याहून इंदोरकडे जाताना हा प्रमुख मार्ग होता. या रस्त्यावर अनेक ठिकाणी बारव बांधण्यात आल्या. परंतु कालौघात त्या नष्ट झाल्या. काही इतिहासात चिरनिद्रा घेण्याच्या मार्गावर आहेत. वीरगावच्या या बारवेचा चिरा अन् चिरा मात्र आजही शाबित आहे.  
    अकोले-सिन्नर रस्त्यापासून साधारण २०० फूट आतमध्ये शेतात या बारवेचे खोदकाम झाले. बारवेची खोली ५८ फूट असून तळापर्यत जाण्यासाठी ४७ पायर्‍या आहेत. कलथा आकाराची ही बारव पुढे रुंद आणि पाठीमागे जिन्याच्या स्वरुपात आहे. बारवेसाठी वापरलेल्या दगडांचा अनेकांनी जवळपासच्या सर्व डोंगरामध्ये शोध घेतला. मात्र कोणत्याही डोंगराचा दगड बांधकामाशी जुळता मिळता नसल्याचे भागवत गंगाराम आस्वले यांनी सांगितले. यावरून त्याकाळी अनेक योजने दूर वरून हा दगड आणला असावा. जागेवर चुन्याचा घाणा करून या बारवेची निर्मिती झाल्याच्या खाणाखुणा मात्र आढळून येतात.  
ahilyabai-holkar
बांधकामासाठी वापरण्यात आलेला दगडही तीन प्रकारचा असून तळचा, मधला आणि वरचा दगड वेगळ्या प्रकारचा आहे. बारवेत दोन आकर्षक कमानी असून राणी अहिल्यादेवी होळकर यांच्या हस्तेच विराजमान झालेली गणपतीची मूर्ती दगडी भिंतीच्या कोनाड्यात स्थानापन्न आहे. श्रीगणेशाच्या मूर्तीची घडणही संशोधनात्मक आहे व हि मूर्ती त्या कोनाड्यात इतकी घट बसवलेली आहे कि तुम्ही कितीही शक्ती वापरली तरी ती थोडीपण हालत नाही. प्रत्येक वाटसरूसाठी निवांत विसाव्याचे हे ठिकाण आहेच. शिवाय त्र्यंबकवारीला आळंदीहून निवृत्तीनाथांच्या दर्शनासाठी जाणार्‍या वारकरी दिंड्यांच्या वास्तव्याचे हे कायमस्वरुपी तीर्थस्थान आहे. 
ahilyabai-holkar
पावसाळ्यातील बारवे मध्ये असलेले पाणी व गणपतीची मूर्ती,

ऐन उन्हाळ्यात बारवेचे पाणी तळ गाठते. इतर ऋतूत मात्र निळेशार थंडगार पाणी येणार्‍या प्रत्येकाची तहान भागविते. दूरवरच्या अनेक संशोधकांनी या स्थळाला भेटी दिल्या असून सखोल परीक्षणाअंती इतिहासाचा लख्ख भूतकाळ समोर आल्याशिवाय राहणार नाही. त्याच बरोबर वीरगाव मधील दिनेश वाकचौरे व रावसाहेब वाकचौरे यांनी आपल्या आईच्या स्मरणार्थ या बारवेची डागडुजी करून तिच्या पाण्याचा वापर गावासाठी योग्य प्रकारे करत आहेत, त्यांच्या या कृतीचे अनुकरण इतिहासाची हेळसांड करणाऱ्यांनी करणे गरजेचे आहे.
उन्हाळ्यात बारवेमधील पाणी तळ गाठते

वाफगाव : होळकरकालीन बुरुजातील विहिर(अंधारी विहिर) 
वाफगाव : ता.खेड जि.पुणे(महा.)

वाफगावचा किल्ला का पाहायला जावा? याची फक्त तीनच कारणे आहेत.
पहिले म्हणजे भुईकोट किल्ल्यामधील दुमजली असलेला राजदरबार,
दुसरे म्हणजे किल्ल्याच्या बाहेरील श्री राजराजेश्वर मंदिर आणि
तिसरे म्हणजे या भुईकोटातील एका बुरुजामध्ये असलेली विहीर.
हि विहीर या भुईकोटातील एक प्रमुख आकर्षण असून तत्कालीन होळकर कालीन पाणी व्यवस्थापनेचा उत्तम नमुना आहे.
ahilyabai-holkar
किल्ल्याच्या बुरुजातील होळकर कालीन अंधारी विहिर.

आजही या विहिरीतील पाण्याचा उपयोग पिण्यासाठी केला जात असून आतापर्यंत जेवढे दुष्काळ आले तरीही या विहिरीच्या पाण्याने तळ गाठला नाही. विहिरीतील पाण्याचे बाष्पीभवन होऊ नये, पाण्यात केर कचरा पडू नये तसेच प्राणी पडून त्यांचा मृत्यू होऊ नये म्हणून त्या पद्धतीच्या बांधणी असलेल्या असंख्य विहिरी तुम्ही पाहिल्या असतील मात्र या विहिरीचे या व्यतिरिक्त वेगळे पण म्हणजे परकीय शत्रू कडून पाण्यात विष मिसळले जाऊ नये म्हणून हि विहीर किल्ल्याच्या प्रमुख बुरुजात निर्माण करण्यात आली आहे व या विहिरीत जाण्यासाठी फक्त एकच मार्ग असून तो किल्ल्याच्या आतून भुयारी मार्ग प्रमाणे आहे.
ahilyabai-holkar
तटबंदी मधून बुरुजातील विहिरीकडे जाणारा मार्ग

हि विहीर म्हणजे होळकर कालीन लष्करी व्यवस्थापनेचा एक उत्तंग नमुना म्हटले तरी वावगे ठरणार नाही. या विहिरीचा निर्माण या भुईकोट किल्ल्याबरोबरच करण्यात आला. हा किल्ला श्रीमंत सुभेदार मल्हारराव होळकर यांच्या राज्यशासन काळात बांधण्यात आला आहे.
किल्ल्याच्या आत श्री विष्णू-लक्ष्मी मंदिर आहे. या मंदिराच्या उजव्या बाजूला असलेल्या तटबंदीमधून बुरुजाकडील विहिरीकडे जाण्याचा भुयारी मार्ग तयार करण्यात आला आहे. या भुयारी मार्गात गेल्यावर डाव्या बाजूला वळून ५० मी. चालत जावे लागते. जाताना या भुयारी मार्गात खूप अंधार असतो. ५० मी. अंतर चालून गेल्यावर उजव्या बाजूला वळावे लागते व तेथून थेट खाली बुरुजातील विहिरीच्या तळापर्यन्त जाणाऱ्या ३० ते ३५ पायऱ्या आहेत आणि पायऱ्यांच्या मधोमध उभे राहण्यासाठी किंवा आराम करण्यासाठी दोन टप्पे निर्माण केले आहेत. पायऱ्या उतरत असताना आपल्याला विहिरीचे निखळ पाणी व त्यावरील पडलेला सूर्य-प्रकाश नजरेस पडतो.  
तटबंदीतून उजव्या बाजूने वळून विहिरीकडे जाणारा मार्ग
विहिरीतील निखळ पाणी

हा सूर्य प्रकाश बुरुजाच्या वरील बाजूने असलेल्या मोकळ्या भागातून आत येण्याची व्यवस्था केली आहे. या विहिरीला “अंधारी विहीर” या नावाने हि ओळखले जाते. या बुरुजातील विहिरी बद्दल जेवढे लिहिल तेवढे कमीच आहे त्यामुळे हि मराठा कालीन वास्तू कलेचा उच्च कोटीच्या आर्किटेक्टचा अजोड नमूना असलेली हि होळकर कालीन बुरुजातील विहीर प्रत्यक्षात जाऊन पाहण्यात जी मजा आहे ती दुसरी कशात नाही.
सूर्य प्रकाश येण्यासाठी केलेली सोय   (बुरुजातून घेतलेला फोटो)
सूर्य प्रकाश येण्यासाठी केलेली सोय.   (बुरुजावरून घेतलेला फोटो)
ahilyabai-holkar
बुरुजामधील विहीर
ahilyabai-holkar
बुरुजावरून घेतलेला फोटो
जर कधी राजगुरूनगरला गेलात तर वाफगावच्या या भुईकोट किल्ल्याला नक्की भेट द्या. राजगुरूनगर पासून वाफगाव हे १२ कि. मी. च्या अंतरावर आहे.

 ब्राह्मणीची बारव व इतर पुरातन पाऊलखुणा

अहिल्यानगरमधून पिंपळगाव माळवीच्या रोडने जाताना वांबोरीचा घाट ओलांडून काही अंतराने वांबोरी गाव लागते‌ गावाच्या सुरुवातीलाच उजवीकडे एक रस्ता जातो. तिथे पहिल्यांदा खोलेश्वर मंदिर पुरातन शंकराचे मंदिर दिसते. गाभाऱ्यात पायऱ्या उतरण्यास खोल आहे. मंदिराचा बाह्यभाग अतिशय प्राचीन दिसल्याने सुंदर भासतो. या मंदिरात बाह्य भागावर अनेक मुर्ती कोरल्या आहेत.
पुढेच वांबोरी गावाच्या वेशीतून गेल्यावर एक पुष्करणीच म्हणजेच वाम तीर्थ नावाची जागा आहे. भव्य अशी पुष्करणी तिथे आहे. बाजूलाच एक भग्न मंदिर आहे आणि मागच्या बाजूला देखील पडीक अवस्थेत असलेले शंकराचे मंदिर आहे. वामतीर्थ हे वाल्मिकी ऋषींचे नावांवरून दिलेले आहे (ऐकीव माहिती).
पुढे आपण ब्राह्मणीची बारव बघायला जाउ शकतो. वांबोरी गावापासून पुढे १२ किलोमीटर वरच ब्राह्मणी गाव आहे.रस्ता अत्यंत चांगला असल्याने प्रवासाचा अजिबात ताण भासत नाही. पुरातत्व खात्याने ही जागा आपल्या ताब्यात घेतल्याने तेथे चांगल्या प्रकारे स्वच्छता व सोय केलेली आहे.
A
बारवे कडचा भाग अत्यंत शांत निर्मळ सुंदर आहे. बाजूला चाफ्याची व इतर प्रकारची शोभिवंत सुगंधी फुले असल्याने आणि आवारा मोठा असल्याने अत्यंत शांत असे वातावरण तेथे आहे. आणि समोरच दिसते ती सुंदर अशी ब्राह्मणी बारव. या बारावेचा साधारणता काळ हा  बाराशे वर्षांपूर्वीचा असावा  नक्कीच ही बारव खूप जुनी आहे. ही बारव पाहताना आपल्याला समोरच एक भग्न अवस्थेतील एक मंडप उंचावर दिसतो.
शांत अशा सुंदर परिसराचा अनुभव घेण्यासाठी ही बारव एकदा नक्कीच पाहिली पाहिजे व डोळ्यांचे पारणे फेडले पाहिजे. गावामध्ये बल्लाळ देवीचे मंदिर आहे ते देखील अति प्राचीन असे आहे. प्राचीन काळी मुस्लिम आक्रमणापासून वाचवण्यासाठी मूर्ती एका दर्ग्यासदृश खड्डा आणि वर उंचवटा अशा आकारात लपवली होती.तो भाग आजही देवीसमोर असून त्यावर चादर होती,त्याची आजही पूजा होते.या ठिकाणी परत नवीन आधुनिक पद्धतीने तिथे ऑइल पेंट मंदिराला दिलेला आहे. त्यामुळे मूर्ती पाहताना थोडा त्रास होतो.परंतु  एकाहून एक सरस अशा मूर्ती तिथल्या खांबांवरती ,तिथल्या मंदिराच्या बाह्य भागावरती कोरल्या आहेत.प्रत्येक मूर्ती ही ही विशेष आणि एकमेकांपासून वेगळी आहे.
    बऱ्याच मूर्ती ह्या ओळखताच येत नाही. काही समाधीस्थ अवस्थेतील मूर्ती पाहून ह्या आणि मोठमोठ्या मूर्तींचे मोठमोठाले कान पाहून ही मूर्ती जैन ऋषींची आहे का किंवा दाढी पाहून ही मूर्ती इजिपशन आहे का अशा प्रकारचे प्रश्न पडतात. प्रत्येक खांबावरती असलेले भार वाहक यक्ष हे सगळे वेगवेगळे आहेत.मंदिराच्या बाह्यभागावर ते देखील कोरलेल्या मूर्ती ह्या सामान्य नव्हत्या मंदिरात मंदिराच्या परिसरामध्येच मागे शंकराचे जुने मंदिर आहे.
या मंदिराची अजून एक विशेषता म्हणजे ज्याप्रमाणे नेवासाला ज्ञानेश्वर महाराजांनी पैस खांबाला टिकून ज्ञानेश्वरी लिहिली त्याचप्रमाणे बल्लाळ देवीच्या आवारात असलेल्या 'अमृतानुभव' या खांबाला टेकून ज्ञानेश्वरांनी 'अमृतांनाभव' हा ग्रंथ लिहिला. बाजूलाच एक अतिशय सुरेख असा शांतपणे बसून आराम करणारा महिषा आहे. जो ज्ञानदेवांनी ज्या रेड्याच्या तोंडून वेद वदवले त्याची प्रतिकृती मानली जाते..
मंदिरामागे एक भव्य तलाव आहे. मागच्या बाजूलाच महादेवाचे मंदिर जे अत्यंत मोठे , खूप पुरातन असणार. आहे कारण की तिथे अतिशय केवळ मंदिर प्रवेशासाठी चौकट किंवा मंदिराची चौकट असलेली एक बाजू आपल्याला दिसते बाकीचे चहू बाजूचे मंदिरे पडलेले आहे.
अ
खोलेश्वर मंदिर
इ
वामतीर्थ
उ

च
ब्राह्मणीची बारव
क
बल्लाळ देवी मंदिर 
Q
ज्या रेड्याच्या तोंडून वेद वदवलेला त्या रेड्याची प्रतिकृती
ऐ
अमृतानुभव खांब
1
ओळखू न आलेली पैकी एक वेगळी मूर्ती
च
सुंदरी
घ
सुरेख सुंदर बाप्पाची पूजा

हत्ती बारव, अहिल्यानगर :-

 अहिल्यानगर येथील कमलादेवी मंदिर परिसरात हत्ती बारव ही विहीर वसलेली आहे.  हत्ती बारव हे ठिकाण अहमदनगर शहरापासून अंदाजे १० किलोमीटर अंतरावर आहे. ही विहिर तिच्या अद्वितीय वास्तुकलेसाठी आणि ऐतिहासिक महत्त्वासाठी प्रसिद्ध आहे.
अहमदनगर येथील कमलादेवी मंदिर परिसरात हत्ती बारव ही विहीर वसलेली आहे. सैराट चित्रपटात या विहीरीचे अद्वितीय सौदर्य दाखवण्यात आले आणि त्यानंतर ही विहिर देशभर प्रसिद्ध झाली.
मध्ययुगीन काळात बांधली गेलेली ही विहीर त्याकाळी महत्त्वाचा जलस्त्रोत म्हणून काम करायची. ही बारव ४०० वर्षे जुनी आहे. निजामशहाच्या काळात शहरात पाणीपुरवठा करण्यासाठी याचा वापर केला जायचा.
या विहीरीला एकूण 96 पायऱ्या आहेत. या ठिकाणी मुख्य मंदिरासमोर शेतात एक भव्य असा बारव असून चिरेबंदी दगडापासून बनवलेल्या बारवाची खोली सात पुरुष म्हणजे शंभर फूट आहे.

हत्ती बारव हे ठिकाण अहमदनगर शहरापासून अंदाजे 10 किलोमीटर अंतरावर आहे. ही विहिर तिच्या अद्वितीय वास्तुकलेसाठी आणि ऐतिहासिक महत्त्वासाठी प्रसिद्ध आहे.

मध्ययुगीन काळात बांधली गेलेली ही विहीर त्याकाळी महत्त्वाचा जलस्त्रोत म्हणून काम करायची. ही बारव 400 वर्षे जुनी आहे. निजामशहाच्या काळात शहरात पाणीपुरवठा करण्यासाठी याचा वापर केला जायचा.

या बारवजवळ चक्क हत्तींचा वापर करून मोटेनं पाणी उचलले जायचे. मग दगडी पन्हळीने ते एका चेंबरमध्ये घेऊन तिथून खापरी नळांच्या जोडणीतून नगर शहराला पाणी पुरवले जायचे. त्याकाळी पाणी खेचण्यासाठी हत्तींचा वापर केला जात असे, म्हणून तिला हत्ती बारव म्हटले जाते.
या बारवजवळ चक्क हत्तींचा वापर करून मोटेनं पाणी उचलले जायचे. मग दगडी पन्हळीने ते एका चेंबरमध्ये घेऊन तिथून खापरी नळांच्या जोडणीतून नगर शहराला पाणी पुरवले जायचे. त्याकाळी पाणी खेचण्यासाठी हत्तींचा वापर केला जात असे, म्हणून तिला हत्ती बारव म्हटले जाते.

मैंदर्गी येथील ऐतिहासिक प्याटी बावी विहीर –

   महाराष्ट्रातील काही गावात आजही ऐतिहासिक  पाऊलखुणा पाहण्यास मिळतात असेच ऐतिहासिक गाव म्हणजे अक्कलकोट तालुक्यातील मैंदर्गी गाव इथे एक ऐतिहासिक  प्याटी बावी विहीर आहे. महाराष्ट्राच्या सोलापूर  जिल्ह्याच्या अक्कलकोट तालुक्यातील गाव आहे. कुरुंदवाड संस्थानात हे तालुक्याचे ठिकाण होते. मैदंर्गीची सुरुवात इ. स. १५०० च्या शतकाच्या मध्याला झाली आहे. सुरुवातीला मेंदर्गी येथे वीरशैव लिंगायत धर्माचे बिदर येथे देशमुख करणारे देशमुख म्हणजे सध्या आडनाव बदल झालेले केसूर, पाटील आणि
 कलमनी बंधू या ठिकाणी आले असल्याची माहिती वीरशैव लिंगायत धर्माचे धर्मपीठ  उज्जैनी येथे नोंदले आहे.गावात प्रवेशासाठी हिप्परगा, सलगर, उडगी आणि कमळा असे चार वेस आहेत, कमळा हे गावाचे नाव नसून जुन्या काळच्या एका बागेचे व विहिरीचे नाव आहे. कमळा वेस भागात ग्रामदैवत महादेव मंदिर आहे. सध्याचे मंदिर साधे आहे, जुने प्राचीन मंदिर पडले आहे, मंदिराच्या अवशेषाचा वापर करुन बावासाहेब विहिरीचे बांधकाम झाले. आजही अवशेष दिसतात. महादेवाची जत्रा ही रुढी, परंपरेनुसार ऐतिहासिक व अनोखी आहे. अनेक वर्षांपासून जत्रेच्या निमित्ताने आठवडे बाजार भरवला जातो. जत्रेची सुरुवात इ. स. १५०० मध्यास सुरुवात झाली आहे.
मेंदर्गी गावात शिवयोगी शिवचलेश्वर यांची अलौकिक कथा असलेले चरित्र घडले. शिवयोगी शिवचलेश्वरास ग्रामदैवताचा दर्जा प्राप्त झाला आहे. त्यांचा महिमा इ. स. १८९० च्या दशकात लोकांना जाणवला. त्यांचा पालखी महोत्सव दरवर्षी मोठ्या प्रमाणात साजरा होतो. पालखी महोत्सवाची सुरुवात इ.स १९४२ ला, तर रथोत्सवाची इ.स.१९६२ला झाली. ग्रामदैवत महादेव जत्रेच्या मानकरी व त्याच पद्धतीने रथोत्सव साजरा केला जातो.अशा ऐतिहासिक मैंदर्गी गावातील प्याटी विहीर बदल सांगणार आहे.
मैंदर्गी येथील ऐतिहासिक प्याटी बावी विहीर
        मैंदर्गी येथील पुरातन प्याटी बावी विहीर भव्य  आहे.मैंदर्गी गावात विहीर आहे. पाऊस भरपूर झाल्यास विहीर पाण्यानी भरलेली असते.जसे पाण्याचे झरे लागतात तशी विहीरीची रचना केली आहे.विहीरीची भव्यता बघण्या सारखे आहे.वैशिष्ट्यपूर्ण काळ्या दगडी बांधकाम केले आहे.अजूनही बांधकाम भक्कम आहे.विहिरीत खाली जाण्यासाठी पायरी व्यवस्था केलेली आहे.आतापर्यंत एकदा विहीर तळ दिसला नाही.पाणी अटलेला नाही असे जाणकार जुने मंडळी सांगतात.
     विहिरीत भिंतीवर शिलालेख बसवले आहे स्थानिक लोकांच्या माहितीनुसार या शिलालेखात गणपतराव बापूसाहेब पटवर्धन आधिपती कुरुंदवाड संस्थान यांनी शके.१७९८ मध्ये प्याटी विहिरीचे जिर्णोदार करण्यात आले आहे. मैंदर्गीत  प्रवेश केल्यानंतर बस स्थानककडे जाताना उजव्या बाजूला  ऐतिहासिक विहीर लागते .विहीरचा सुरक्षित विचार करून स्थानिक नगरपरिषदने लोंखडी चाळी बसलेले आहेत.
विहीरत  वरच्या बाजूला पाणी काढण्यासाठी जुन्या पद्धतीचे रहाट बसविले आहेत.सध्या विहीरीच्या बाजूला बांधकाम सुरू आहे.विहीरी च्या चारही बाजूने घरे असून मध्यभागी विशाल व भव्य विहीर आहे.ऐतिहासिक पुरातन प्याटी विहीर हे मैंदर्गी  गावाचे वैभवात भर टाकणारी स्थळ आहे.त्याची जतन व संवर्धन होण्याची गरज आहे.

वेळापुर येथील अर्धनारीनटेश्वर मंदीरातील बारव :-

            अर्धनारी नटेश्वर वेळापूरचे ग्रामदैवत. मंदिराच्या प्रवेशद्वाराबाहेर उजव्या बाजूस छोट्या बांधकामामध्ये सुंदर ऐटीत बसलेली गणेशमूर्ती दिसते. डाव्या बाजूस उंच दीपमाळ आहे. तेथे मोठी बारव आहे. बारवेमध्ये पाण्याला सर्व बाजूंनी झरे असल्याने बारव उन्हाळ्यात कधीही कोरडी पडली नाही. मुख्य मंदिरासमोर बारवेत नैऋत्य कोप-यामध्ये लहान मंदिर आहे. त्यामध्ये दोन शिवलिंगे आहेत. त्यांना काशीविश्वनाथ व रामेश्वर स्थान असे म्हणतात. ही दोन्ही शिवलिंगे पावसाळ्यात पाणी पातळी वाढल्यानंतर पाण्याखाली जातात, म्हणून बारवेतील जलाला सर्व तीर्थांचे महत्त्व लाभते अशी भाविकांची धारणा आहे. त्यांच्या शेजारी वायव्य बाजूला बळीश्वर मंदिर आहे. बळीश्वर मंदिराचे बांधकाम दगडी पाषाणामधील खांब व शिळा यांमध्ये बांधलेले आहे. ते मंदिर मुख्य मंदिराच्या समोर बारवेशेजारी थोडे खाली, जमिनीमध्ये असलेले दिसते. मंदिराच्या गाभा-यामध्ये दोन शिवलिंगे आहेत. 

करमाळ्याची सात विहीरींची बारव :-

करमाळा हा भाग दुष्काळी, पाऊस हा ५०० मि.मी च्या आसपास पडणारा, तापमान ४५ अंश सेंटिग्रेटपर्यंत जाणारे, शुष्क हवा, हलकी जमीन असलेला आणि सीना ह्या तुटीच्या खोऱ्यातला आहे.  त्या ठिकाणच्या उपलब्ध पाण्याच्या व्यवस्थेवरून बऱ्याच गोष्टींचा उलगडा होतो. किल्ल्याच्या पश्चिमेकडे एक मोठा तलाव आहे. त्या तलावाला लागूनच एक सात विहीरींची बारव आहे. या बारवेचा आकार १५० - २०० फूट व्यासाचा आहे. तिची खोली ७० -८० फूट असावी. त्या विहीरीमध्ये परत सात विहीरी आहेत आणि पाणी हे जमिनीला काठोकाठ असे भरलेले असते.
सात नाल्याची किंवा सात विहीर, करमाळा

DSCF5384.JPG
 ही मोठ्या आकाराची प्रचंड विहीरी, विहीरखोदाईच्या शास्त्रातील आश्चर्य मानायला काही हरकत नाही. ती कढईच्या आकाराची आहे. ज्या लहानशा नाल्यावर हा तलाव बांधलेला आहे तोच नाला पुढे खंदकाला पाणी पुरवठा करतो. या सात विहीर नावाच्या मोठ्या विहीरीवरून करमाळा गावासाठी पिण्याच्या पाण्याचा पुरवठा अलिकडे म्हणजे अगदी १९६० पर्यंत होत होता असे कळते. विहीरीपासून काढलेल्या एका नलिकेद्वारे पाणी पुरवठा केला जात असे. त्याला पुढे हौदाची मालिका जोडलेली आहे. ही व्यवस्था आजसुध्दा उध्वस्त झालेल्या अवस्थेत आपणास दिसते. दोन माणसाद्वारे किंवा रहाटाचा उपयोग करून या नलिकेला (पाईपलाईनला) सातत्याने पाणीपुरवठा केला जात होता असे सांगतात. अलिकडच्या काळात दूर अंतरावरून (सीना नदीतून) पाईपलाईनद्वारे पिण्याच्या पाण्याची व्यवस्था झाल्यामुळे ही सर्व जुनी ऐतिहासिक व्यवस्था आज वापरात नाही.

करमाळ्याची हत्ती बारव ( सैराट' चित्रपटातील ) :-

        कमलादेवी मंदिर परिसरातील आणखी एक महत्त्वाची बाब, ती म्हणजे "सैराट' चित्रपटानंतर संपूर्ण राज्यात चर्चेला आलेली "हत्ती बारव' ९६ पायऱ्यांची विहीर ! मुख्य मंदिरासमोरील शेतामध्ये एक भव्य असा बारव असून चिरेबंदी दगडापासून बनविलेल्या बारवाची खोली सात पुरुष म्हणजे शंभर फूट आहे. या बारवेवर हत्तीची मोट चालायची असे सांगितले जाते. कातीव दगडात बांधलेल्या ह्या अष्टकोनी विहिरीत पाणी जवळपास ५० ते ६० फुट खोलवर असेल. पण पाण्यासाठी त्या खोलीपर्यंत बांधलेल्या एकसारख्या सुरेख ९६ पायऱ्या आहेत.  तत्कालीन कालखंडात कुठलीही यंत्रसामुग्री उपलब्ध नसताना एवढी विहीर खोदताना किती कष्ट उपसावे लागले असतील याचा अंदाज करता येत नाही. मंदिर बांधकामासाठी जेवढा खर्च आला त्यापेक्षा एक पैसा जास्त खर्च या बारवावर झाल्याचे मौखिक इतिहासातून सांगितले जाते.


Step well 1


Stepwell 2








Step Well.jpg
    बारवाचा आकारमान मोठा असल्याने त्यावर चालणारी मोटसुद्धा हत्तीची होती. हत्तीचा वापर करून मोटेच्या साहाय्याने पाणी काढून ते शेजारच्या शेताला दिले जायचे. देवीच्या पूजेसाठी लागणारी बाग त्या ठिकाणी होती. आजही ‘हत्ती बारव’ हा पूर्णपणे सुस्थितीत असून पाणी काढण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या मोटेचे अवशेष त्या ठिकाणी पाहण्यास मिळतात. बारवाच्याच बाजूला एक छोटीशी समाधी असून ती मोटेकरिता वापरण्यात येणाऱ्या हत्तीची असल्याचे सांगितले जाते.
    पुरातन काळापासून पाणी पुरवठ्यासाठी बांधलेल्या अशा विहिरी (step wells) भारतभर पाहायला मिळतात. ह्या विहिरीचे वैशिष्ट्य म्हणजे हि अगदी दक्षिण उत्तर अक्ष ठेऊन बांधली आहे. उत्तरेकडून पायर्या आणि दक्षिणेला विहीर. ह्या अक्षाचा फायदा म्हणजे सुर्यभ्रमण पूर्वेकडून पश्चिमेकडे होत असल्यामुळे, पाणी आणि पायऱ्या दिवसभर जास्तीजास्त वेळ सावलीत राहतात फक्त भरदुपारी १२ वाजण्याच्या आसपास पाण्यावर सूर्यकिरण पोहोचतात. त्यामुळे बाष्पीभवन कमी प्रमाणात होते आणि सावलीतील पायऱ्या वापरणेही सोयीचे होऊन जाते. भारतभर जवळपास सगळ्याच अशा विहिरी (step Wells) ह्याच संकल्पनेवर बनलेल्या दिसतात हे विशेष. आपल्या पूर्वजांचे वातावरणाला अनुकूल करून घेणारे स्थापत्य बघून थक्क व्हायला होते. अर्थातच आपण जशी अनेक पुरातन पाणवठ्याची जशी वाट लावली आहे तशीच ह्या विहारीची देखील लावली आहे. पाणी उपसा नसल्यामुळे आणि कचरा टाकल्यामुळे पाणी प्रदूषित झाले आहे. जवळपास सगळीकडे गवत पसरले आहे आणि ह्या ऐतिहासिक ठेव्याशेजारीच ग्रामपंचायतीने महिलांसाठी असलेले पण बंद असणारे स्वच्छतागृह बांधले आहे.

औंढे खुर्द ( मावळ ) येथील बारव :-

नाणे मावळातील औंढे खुर्द हे तसे ऐतिहासिक गाव. गावात नागनाथ महादेवाचे जूने ऐतिहासिक देऊळ आहे. देवळासमोर मंदिराचेच प्राचीन अवशेष, वीरगळ, स्मृतिशिळा आहेत. एका शिळेवर तर येथील स्थानिक वतनदार असलेल्या ‘मोवाजी पाटील भोसले मोकदम’ यांचा नामोल्लेख करणारा शिलालेखही आहे. त्याशेजारीच शिव-पार्वतीची ‘रावणानुग्रह’ मूर्ती आहे. देवळपासून जवळच गोवत्स शिळा आहे. हे शिल्प गुरांना चरण्यासाठी दान दिलेल्या गवताळ जमिनीवर सामान्यतः आढळून येते. नागनाथ मंदिराच्या मागील तलावापासून थोड्या अंतरावर वाघोबाचे स्थान आहे. वाघोबाचे शिल्प या भागात महत्वाच्या खिंडींमध्ये किंवा जवळच्या गावात आढळून येतात. गावाच्या दक्षिणेस ‘धामणदऱ्या’च्या पायथ्याला एक कातळात कोरलेली पाणपोढी आहे. पोढी म्हणजे पाणी साठवण्यासाठी तयार केलेली टाकी. अशा पोढी लेण्यांमध्ये तसेच व्यापारी मार्गांवरही मोठ्या प्रमाणात आढळून येतात.
‘डोंगरगावातून धामणदऱ्याकडे जाणाऱ्या मार्गावर याच औंढे खुर्द गावाच्या हद्दीत एक मराठाकालीन बारव म्हणजे पायऱ्यांची विहीर आमच्या पाहण्यात आली. बारवेचा आकार चौरसाकृती असून त्यात उतरण्यासाठी दक्षिणेकडून पायऱ्या आहेत. पायऱ्यांच्या उजव्या भिंतीवर बारवेच्या निर्मितीचा ४ ओळींचा उठावदार शिलालेख असून बारव व शिलालेखाची नोंद यापूर्वी कुठेही झालेली नाही. शिलालेखातील मजकूर पुढीलप्रमाणे:
दुल्लभसेट गोविदजि श
के १७१२ साधारण नाम
संवत्सरे चैत्र शुध्ध प्र
तिपदा प्रारंभ ॥
शिलालेखात नमूद ‘दुल्लभशेट गोविंदजी’ हे या बारवेच्या निर्मात्याचे नाव. शके १७१२ चैत्र शुद्ध प्रतिपदेला म्हणजे गुढीपाडव्याच्या शुभ मुहूर्तावर (मंगळवार, १६ मार्च १७९० रोजी) या बारवेच्या बांधकामास सुरुवात झाली. असा या लेखातून सर्वसाधारण अर्थ निघतो. पेशवे दप्तरांत अप्रकाशित स्वरुपात उपलब्ध असलेल्या इ.स. १७८२-८३ च्या दोन ऐतिहासिक कागदपत्रांमध्ये या व्यक्तीचा उल्लेख ‘दुल्लभशेट गोविंदजी गोसावी’ असा आला आहे. कोकणातील गाडद्यांसाठी बंदुकीच्या दारुची मागणी करणारे व कल्याण प्रांतातील कोळी व इंग्रजांचा बिमोड करण्याविषयीची ही दोन पत्रे दुल्लभशेट यांस उद्देशून लिहण्यात आलेली आहेत. अर्थात दुल्लभशेट हा मराठेशाहीच्या उत्तरार्धातील इतिहासातील एक महत्त्वाचे असे व्यक्तिमत्त्व होते.
मावळात उत्तर मराठा कालखंडातील अनेक शिलालेख उपलब्ध होत आहेत. हा प्रदेश त्या काळात पेशव्यांच्या थेट अंमलाखाली होता. त्यामुळे पेशव्यांशी संबंधित लोकांचा वावरही येथे मोठ्याप्रमाणात होता. धामधुमीच्या काळात पुणे परीसरातील लोकसंख्या लोहगड-विसापूर तसेच मावळातील इतर अनेक किल्ल्यांच्या आश्रयास आल्याचे उल्लेख या कालखंडातील ऐतिहासिक साधनांमधून विखूरलेले आढळून येतात. पेशव्यांकडूनही अनेक कारणांमुळे इनाम मिळालेल्या जमिनींवर हे लोक येऊन स्थायिक होत होते. मावळातील अनेक गावांमध्ये ब्राह्मणांच्या स्वतंत्र वसाहती म्हणजेच लहान वाड्याही दिसून येतात, जेथे सध्या ब्राह्मण कुटूंबांच्या ऐवजी कुळाची वस्ती आहे. या ब्राह्मण वसाहतींचे संदर्भच मूळी अठराव्या शतकातील आढळून येतात. हे संदर्भ म्हणजे काय तर कागदपत्रांतील त्यांचे उल्लेख तसेच या वाड्यामध्ये त्यांच्याकडून बांधकाम करण्यात आलेल्या वास्तू, मंदिरे आणि पाणवठे.
नाणे मावळातील औंढे खुर्द हे तसे ऐतिहासिक गाव. गावात नागनाथ महादेवाचे जूने ऐतिहासिक देऊळ आहे. देवळासमोर मंदिराचेच प्राचीन अवशेष, वीरगळ, स्मृतिशिळा आहेत. एका शिळेवर तर येथील स्थानिक वतनदार असलेल्या ‘मोवाजी पाटील भोसले मोकदम’ यांचा नामोल्लेख करणारा शिलालेखही आहे. त्याशेजारीच शिव-पार्वतीची ‘रावणानुग्रह’ मूर्ती आहे. देवळपासून जवळच गोवत्स शिळा आहे. हे शिल्प गुरांना चरण्यासाठी दान दिलेल्या गवताळ जमिनीवर सामान्यतः आढळून येते. नागनाथ मंदिराच्या मागील तलावापासून थोड्या अंतरावर वाघोबाचे स्थान आहे. वाघोबाचे शिल्प या भागात महत्वाच्या खिंडींमध्ये किंवा जवळच्या गावात आढळून येतात. गावाच्या दक्षिणेस ‘धामणदऱ्या’च्या पायथ्याला एक कातळात कोरलेली पाणपोढी आहे. पोढी म्हणजे पाणी साठवण्यासाठी तयार केलेली टाकी. अशा पोढी लेण्यांमध्ये तसेच व्यापारी मार्गांवरही मोठ्या प्रमाणात आढळून येतात.
‘धामणदरा’ हे औंढे गावाला आपटी या गावाशी व‌ पर्यायाने नाणे मावळास पवन मावळाशी जोडणाऱ्या एका खिंडीचे नाव. कोकणातून कुरवंडे किंवा बोरघाटमार्गे लोणावळ्यात येणारा मार्ग पुढे विभागला जात असे. एक मार्ग आजच्या जुन्या पुणे-मुंब‌ई महामार्गावरुन चाकण किंवा पुण्यास जात असे. तर दुसरा मार्ग कुसगाव बुद्रुक – डोंगरगाववाडी – औंढे मार्गे धामणदऱ्यातून पुढे आपटी – आंबेगाव – डोणे – कासारसाई – मारुंजीमार्गे पुण्याकडे जात असे.
वर उल्लेख केलेल्या डोंगरगावच्या वाडीतही एक ऐतिहासिक बारव आहे. ही चौरसाकृती बारवेचा निर्माता रामाजी महादेव बिवलकर असून त्यावर शके १६८८ चैत्र शुद्ध प्रतिपदा (म्हणजेच १० एप्रिल १७६६) असा दिनांक आहे. कल्याण-साष्टी प्रांताचा तसेच उत्तर कोकणचा सरसुभेदार म्हणून हा व्यक्ती मराठा इतिहासात तसा बराच प्रसिद्ध आहे. या बारव व शिलालेखांची पूर्वी नोंद झालेली आहे. 
डोंगरगावातून धामणदऱ्याकडे जाणाऱ्या मार्गावर याच औंढे खुर्द गावाच्या हद्दीत एक मराठाकालीन बारव म्हणजे पायऱ्यांची विहीर आहे. बारवेचा आकार चौरसाकृती असून त्यात उतरण्यासाठी दक्षिणेकडून पायऱ्या आहेत. पायऱ्यांच्या उजव्या भिंतीवर बारवेच्या निर्मितीचा ४ ओळींचा उठावदार शिलालेख असून बारव व शिलालेखाची नोंद यापूर्वी कुठेही झालेली नाही. शिलालेखातील मजकूर पुढीलप्रमाणे:
दुल्लभसेट गोविदजि श
के १७१२ साधारण नाम
संवत्सरे चैत्र शुध्ध प्र
तिपदा प्रारंभ ॥

शिलालेखात नमूद ‘दुल्लभशेट गोविंदजी’ हे या बारवेच्या निर्मात्याचे नाव. शके १७१२ चैत्र शुद्ध प्रतिपदेला म्हणजे गुढीपाडव्याच्या शुभ मुहूर्तावर (मंगळवार, १६ मार्च १७९० रोजी) या बारवेच्या बांधकामास सुरुवात झाली. असा या लेखातून सर्वसाधारण अर्थ निघतो. पेशवे दप्तरांत अप्रकाशित स्वरुपात उपलब्ध असलेल्या इ.स. १७८२-८३ च्या दोन ऐतिहासिक कागदपत्रांमध्ये या व्यक्तीचा उल्लेख ‘दुल्लभशेट गोविंदजी गोसावी’ असा आला आहे. कोकणातील गाडद्यांसाठी बंदुकीच्या दारुची मागणी करणारे व कल्याण प्रांतातील कोळी व इंग्रजांचा बिमोड करण्याविषयीची ही दोन पत्रे दुल्लभशेट यांस उद्देशून लिहण्यात आलेली आहेत. अर्थात दुल्लभशेट हा मराठेशाहीच्या उत्तरार्धातील इतिहासातील एक महत्त्वाचे असे व्यक्तिमत्त्व होते.
   ही बारव एका शेतात असल्यामुळे येथील शेतीसाठी पाणीपुरवठा करण्यास तिचा उपयोग होत असणार यात काही शंका नाही. पण मार्गालगतही असल्यामुळे धामणदऱ्याकडे जाणाऱ्या प्रवाशांना या पाणवठ्याचा काही उपयोग होत असावा का? किंवा या जमिनीचा आणि दुल्लभशेटचा थेट संबंध कसा? अशा अनेक प्रश्नांची उत्तरे मावळच्या इतिहासाच्या एक-एक पानांसह हळूहळू पुढे उलगडली जातीलच. 

घुमटाची विहीर :-

    पराक्रमी सरदार खंडेराव दाभाडेंच्या काळात निर्मिली गेलेली आणि वास्तुस्थापत्याचा सुंदर आविष्कार असलेली ही विहीर पर्यटनाच्या दृष्टीने दुर्लक्षित का राहिली याचे आश्चर्यच वाटते. विहिरीजवळच्या घुमटाकार वास्तूमुळे विहिरीचं नाव ‘घुमटाची विहीर’ असे पडले असावे, असे अभ्यासकांचे मत आहे. बांधकाम घडीव दगडातच झालेले आहे. विहिरीत उतरण्यासाठी पायऱ्या आहेत. आतील बाजूस मध्यभागी एक धक्का बांधलेला दिसतो. मध्यभागी दोन कमानी आहेत. त्यावर शिलालेखही कोरलेला आहे. या विहिरीवर दोन मोटी चालायच्या. त्यांचे धक्केही दिसतात. इतिहासकारांच्या मते या मोटीद्वारे शेतीला पाणी पुरवले जाई. विहिरीच्या आत छोटे शिवमंदिर आहे. विहिरीच्या बांधणीत किती मुद्दे विचारात घेतले आहेत हे पाहून आपण स्तंभित होतो.

घुमटाची विहीर

बामणडोह :-

   शिवलिंगाच्या आकाराची ही विहीर घुमटाच्या विहिरीसारखीच सुंदर आहे. संपूर्ण दगडातच बांधलेल्या या विहिरीत उतरण्यासाठी पूर्वेकडून पायऱ्या आहेत. साधारण मध्यभागी आलो की आतमध्ये फिरण्यासाठी गवाक्षांचा अर्धवर्तुळाकार मार्ग दिसतो आणि पाहणारा चकित होतो. बाहेर आलो की विहिरीवर असलेल्या मोटेच्या धक्क्य़ापाशी जावे. पाणी उपसण्यासाठी अशी बांधकामे महाराष्ट्रात बऱ्याच ठिकाणी आढळतात. हि विहीर  सरसेनापती खंडेराव दाभाडे यांच्या  समाधीजवळ वायव्येकडे जंगलात जेमतेम ५० मीटर अंतरावर आहे.पुणे-मुंबई रेल्वे ट्रॅकच्या दक्षिणेस फक्त १० मीटर अंतरावर हि विहीर आहे. ही विहीर कधी बांधली गेली याबद्दल कोणतेही संकेत नाहीत, जरी मी ती बाणेश्वर मंदिराच्या समकालीन मानली जाते.




 
 
 
 
 
 
बामण डोह विहिर - तळेगाव दाभाडे

जुन्नर तालुक्यातील  बारवा :-

   बारव ही एक पुर्वजांची अशी संकल्पना आहे की या ठिकाणी प्रत्येक प्राणी मात्रांस आपली मनसोक्त पणे कुणाचीही मदत न घेता तहान भागविता येते अशी उत्कृष्ट बांधकाम केलेली जागा. म्हणून बारव संवर्धन ही संकल्पना गेली अनेक वर्षे मी राबवतोय. या बारवेत उतरण्यासाठी पायऱ्यांचा मार्ग असल्याने दिवसा मनुष्य व पक्षी पाणी पितात तर रात्री तहानलेल्या वन्यजीवांची तहान या बारवा भागवितात. म्हणूनच या बारवांचे तसेच पुष्करणींचे संवर्धन होणे गरजेचे आहे. मनुष्याने जरी या बारवांचा वापर केला नाही तरी आपले संवर्धन कार्य वाया न जाता पशुपक्ष्यांच्या कामी येत. जुन्नर तालुक्यात एकुण अद्याप १३ बारवांपर्यत पोहचुन त्यातील काही बारवांना स्वच्छता करून मोकळा श्वास देता आला आहे. तर जुन्नर तालुक्यात एकुण चार पुष्करणी पैकी एका पुष्करणीस प्रकाशझोतात आणता आले आहे.












जुन्नर तालुक्यात आपण १३ बारव कोठे पहाल.
१) बारा बावडी १ - जुन्नर शहरात
२) बारा बावडी २ - जुन्नर शहरात
३) कुंदलबावडी - जुन्नर शहरात
४) आमडेकर विहीर - पाडळी
५) भोरवाडी बारव - भोरवाडी
६) कुतळमळा बारव - कुतळमळा
७) खानेवाडी बारव - चौदानंबर
८) गणेशनगर(गोसावी बाबा मंदिर) - येडगाव
९) खंडोबा बारव. - धामणखेल
१०) हडसर बारव - हडसर
११) जीवधन बारव - घाटघर
१२) आमडेकर बारव १ - घाटघर
१३) आमडेकर बारव २ - घाटघर
जुन्नर तालुक्यात आपण ४ पुष्करणी कोठे पहाल?
१) बेल्हे
२) किल्ले चावंड
३) धामणखेल खंडोबा डोंगर
४) किल्ले निमगिरी पायथा

श्रीराम बारव आणि गुंजाळवाडी (नारायणगाव) गावचा ऐतिहासिक वारसा –

       जुन्नर तालुक्यातील मीना नदीच्या दक्षिणेस काही अंतरावर वसलेले एक छोटंसं परंतु तेवढेचं ऐतिहासिक व नैसर्गिक सुंदरतेने नटलेले व संतमहंतांच्या पदपर्शाने पावन झालेले खेडेगाव म्हणजे गुंजाळवाडी (नारायणगाव) होय. या गावाच्या शेजारी जवळच पिंपळगाव तर्फे नारायणगाव, आर्वी व नारायणगाव ही ऐतिहासिक वारसा लाभलेली गावे आहेत. जुन्नर तालुक्यातील मध्य पट्ट्यातील ही पर्यटनासाठी तितकीच महत्त्वाची गावे असून पर्यटनस्थळांचे जतन करून हे ऐतिहासिक वैभव श्रीराम बारव आणि गुंजाळवाडी ग्रामस्थांनी जगासमोर आणून गावांचा विकास साध्य केला जाऊ शकतो.
      गुंजाळवाडी गावठाण अजुनही जुन्या पध्दतीच्या घरांनी व्यापलेले असुन गावाने अजूनही खेडुतपणा जपण्याचा यशस्वी प्रयत्न केला आहे.या गावातील कुटुंबांची तहान बाराही महिने भागविते ती येथील असलेली ऐतिहासिक श्री राम बारव. गावच्या जुन्या चावडीच्या उत्तरेस तर ग्रामपंचायतीच्या नवीन इमारतीच्या पूर्वेला आपणास ही बारव दक्षिणोत्तर स्वरूपात पहावयास मिळते. ग्रामस्थांनी येथील बारवेचे संवर्धन अतिशय सुंदर पद्धतीने केले असुन रहदारीच्या विळख्यात ही बारव असल्याने संपूर्ण बारवेस लोखंडी पत्र्याच्या सहाय्याने झाकून घेत कुणाचीही जीवित हानी होणार याची ग्रामस्थांनी काळजी घेतली आहे.

बारवेस पश्र्चिमेकडुन उतरण्यासाठी पायरी मार्ग असून आठ दहा पाय-या उतरून खाली गेले की डाव्या हाताला वळताच तेथेच पश्र्चिम भिंतीत सुंदर अशा देवळीत साधारण अडीच तीन फुट उंचीचे श्रीगणेश विराजमान असलेले पहावयास मिळतात तर समोरच उत्तर कमानीवर एक मानविआकृतीचे दगडी शिल्प असून ते कशाबाबतचे आहे ते समजू शकलो नाही. बारवेतील पाणी एवढे स्वच्छ आहे की आपणास त्यात डोकावताना अगदी तळापर्यंत सहज पाहता येते. बारवेच्या पुर्वेस लागुनच श्रीराम पंचायतन मंदिर असुन ते 200 वर्षे जुने असल्याचे ग्रामस्थ सांगतात. हे श्री राम मंदिर ,श्री हनुमान मंदिर संपूर्ण सुंदर लाकडी कलेत साकारलेले असुन जुन्नर तालुक्यातील एकाही मंदिरास किंवा जवळपास असलेल्या तालुक्यातील मंदिरात अशी लाकडावरील कला कुसर पहावयास मिळत नाही. या मंदिराच्या छताला लावलेले लाकडावरची नक्षीकाम पाहतच रहावी अशीच आहे.
     श्री राम व श्री हनुमान मंदिर यांना श्री राम पंचायतन म्हणून ओळखले जाते. हे मंदिर ह. भ. प. सहादूबाबा भाऊ वायकर यांचे वडील श्री भाऊ वायकर , व त्यांचे बंधू श्री गणाजी वायकर यांनी बांधले असून आतमध्ये वापरण्यात आलेले सर्व मार्बल हे त्या काळी जपान वरून आणले असल्याचे ग्रामस्थ सांगतात. आजही त्या मार्बलचा रंग हा आहे तसाच आहे. ह. भ. प. सहादू बाबा वायकर यांची समाधी, नागदेवता शिल्प मंदिरा समोरच पश्र्चिमेस आहे. मंदिराच्या पाठिमागे पुर्वेस ग्रामदैवत आई मुक्तादेवी मंदिर असुन या मंदिरात काळ्या पाषाणात मुक्तादेवीची अखंड सुबक मूर्ती सिंहावर विराजमान असलेली पहावयास मिळते. विशेष म्हणजे जुन्नर तालुक्यात या स्वरूपाची देवीची काळ्या पाषाणातील मूर्ती इतरत्र कुठेही आढळून येत नाही.
मुंबई मधील “भाऊचा धक्का” आपणास फक्त माहीत असेल व तो भाऊचा धक्का आजही खुप प्रसिद्ध असून त्याचे मुळ हे जुन्नर तालुक्यातील असुन त्या धक्का  ह. भ. प. सहादूबाबा  वायकर यांचे वडील श्री भाऊ वायकर यांच्या मालकीचा होता. त्यांच्या नावावरूनच त्याला भाऊचा धक्का म्हणून नाव पडले असे ग्रामस्थ सांगतात. गावची जुनी परंपरा कायम राखली जावी म्हणून आजही ग्रामसभा ही पूर्वीपासून ग्रामचावडीमध्येच होत असते. दर १२ वर्षांनी जो कुंभमेळा नाशिकमध्ये होतो त्यानंतर तेथील काही साधूंची धुंड ही तीन दिवस याच मंदिरात थांबत असते.
मंदिराच्या पाठिमागे असलेल्या वटवृक्षाचे झाड पण खूप मोठे असून फार जुने असुन ग्रामस्थांनी ते जतन करण्यासाठी योगदान दिले आहे. सांगितले जाते की ह. भ. प सहादू बाबा वायकर हे त्या काळी स्वतः कोणताही मोबदला न घेता पायी प्रवास करून महाराष्ट्र भर कीर्तन करत असत . ह भ प श्री सहदूबाबा वायकर हे ह भ प कोंडाजी बाबा डेरे यांचे गुरू होते. जुन्नर तालुक्यातील ओतूर वरून पंढरपूर ला जाणारी चैतन्य महाराजांची पालखी ही ह. भ. प. सहादू बाबा वायकर यांनी त्या काळी प्रथम चालू केली होती. विशेष म्हणजे ह. भ. प. सहादू बाबा वायकर यांनी स्वहस्ते लिहीलेली संत तुकाराम महाराजांची अभंगगाथा आजही आपणास येथे पहावयास मिळते. 
 मंचर येथील बारव :-
     मंचर हे शहर मध्ययुगीन काळात एक लहान गाव होते, जे पैठण (त्याच्या साड्यांसाठी प्रसिद्ध) आणि जुन्नर या ऐतिहासिक शहरांना जोडणाऱ्या व्यापारी मार्गावर वसलेले होते. मंचरमध्ये आढळणारी बारव हा 'खारडी नाला' नावाच्या एका लहान ओढ्याशेजारी बांधली आहे. या बारवेमध्ये एका नैसर्गिक झऱ्याच्या पाणी उदगम आहे आणि वर्षभर त्यात भरपूर पाणी असते. 
मंचर येथील बारव
   मंचर येथील बारव चौरसाकृती आकाराची आहे आणि तीचा आकार खाली निमुळता होत जातो. वरच्या बाजूला २२ मीटर रुंदीपासून खालच्या बाजूला जवळजवळ अर्ध्या लांबी (११ मीटर) पर्यंत लहान होतो. बारवेला दोन प्रवेशद्वार आहेत - एक दक्षिणेकडून आणि दुसरे पूर्वेकडून. या दोन प्रवेशद्वारांवरून खाली उतरल्यानंतर बसण्यासाठी सपाट जागा आहे.
 
 

 



 मंचर येथील बारवचे रचना आकर्षक आहे. सहा शतकांपूर्वी बांधलेल्या पायऱ्या हे या बारवचे एक उल्लेखनीय वैशिष्ट्य आहे. मागून येणारा मातीचा जोर संतुलित करण्यासाठी लगतच्या पायऱ्यांमध्ये नियमित अंतराने बाहेर काढलेले दगडी चिरे दिसतात. त्याचा वापर बसण्यासाठी  देखील केला जात असे, दगडाच्या या बांधकामामुळे एक सुंदर लयबद्ध रचना तयार झाली आहे
 
 The intricate plan and section design of the
 मंचर येथील बारवेची रचना

     पश्चिमेकडील भिंतीमध्ये एक दगडी शिलालेख आहे जो या बारवच्या बांधकामाबद्दल एक मनोरंजक कथा सांगतो. संस्कृत शिलालेखानुसार, मणिचर (मंचरचे पूर्वीचे नाव) हे अमरगिरीच्या डोंगरात वसलेले एक सुंदर गाव होते. मणिचरमध्ये, लादिदेव नावाचा एक सक्षम, न्यायी, धाडसी आणि देखणी व्यक्ती राहत होता, हा गावप्रमुखाचा मुलगा होता (या प्रमुखाचा पट्टेलवर्य म्हणून उल्लेख केला आहे ). एका रात्री, लादिदेवच्या स्वप्नात पृथ्वी माता आली, तीने त्याच्या गावात कायमचे राहण्याची इच्छा व्यक्त केली. दुसऱ्या दिवशी जागे झाल्यावर, लाडीदेवला त्याचे स्वप्न आठवते आणि तो गावातील एका योग्य ठिकाणी एक बारव बांधण्याचा निर्णय घेतो जिथे पृथ्वी माता पाण्याच्या रूपात कायमची राहु शकेल. त्याला वाटले की हि बांधलेली बारव मंचरच्या ग्रामस्थांना वारंवार येणाऱ्या दुष्काळामुळे येणाऱ्या पाण्याच्या त्रासातून मुक्त होण्यास मदत करेल. या विचारांसह, लाडीदेव शक संवत १२६६ (म्हणजे १३४४ इ.स.) मध्ये एका शुभ दिवशी बारव बांधण्याचे काम सुरू केले (संदर्भ: मांडके,  २००३).
 मंचर येथील बारवच्या भिंतीवर दगडी शिलालेख आहे. 

आज हि बारव मंचरमधील लोकांमध्ये 'अंघोळीची बारव' म्हणून प्रसिध्द आहे. बरेच प्रौढ आणि शाळेत जाणारी मुले पहाटेच्या वेळी आंघोळीसाठी येथे जमतात. “आम्हाला या ऐतिहासिक बारवमध्ये पोहायला आवडते. उन्हाळ्यातही ते नेहमीच पाण्याने भरलेले असते. आम्ही येथे पहाटे ५ वाजता येतो आणि कधीकधी दुपारपर्यंत पोहण्याचा आनंद घेतो. बारवचे पाणी स्वच्छ ठेवण्यासाठी साबण लावणे आणि आंघोळ करणे प्रतिबंधित आहे.आमच्या मुलांमध्ये बारव्यात उडी मारण्याच्या स्पर्धा होतात. पाण्यात डुबकी मारणे खूप मजेदार असते.  ” – असे येथील स्थानिक लोक सांगतात.
मंचरमधील लोक बारव साफसफाई आणि गाळ काढताना. (स्रोत: राऊत, धनेश, २०२२)

बारवेच्या पूर्वेकडील बाजूला पायऱ्यांचे एक लहान कुंड आहे.एका लहान पाटाचा वापर करुन बारवचे पाणी कुंडात वाहून नेते, जाते, जिथे स्थानिक महिला कपडे धुताना. महिला दररोज या कुंडावर कपडे धुण्यासाठी जमतात. 
     अशाप्रकारे, बारव पुरुषांसाठी सामाजिक संवादाचे ठिकाण बनली आहे, तर कुंड महिलांसाठी गप्पांचे ठिकाण बनले आहे,यामुळे त्याना त्यांच्या दैनंदिन दिनचर्येतून विरंगुळा मिळतो आणि कपडे धुताना एकमेकांशी गप्पा मारण्यासाठी काही फुरसतीचे क्षण मिळतात.

  लोणी भापकर येथील बारव 

 लोणी भापकर गावात १४ व्या शतकात बांधलेली एक सुंदर बारव आहे.  शिव आणि विष्णूची मंदिरे असणार्या परिसरात हि बारव आहे, आज, मूळ शिव मंदिर जीर्ण अवस्थेत आहे, तर विष्णू मंदिराच्या जागी एक नवीन दत्तात्रय मंदिर बांधले गेले आहे. विशेष म्हणजे, हि बारव दोन्ही मंदिरांच्या दृष्ट्या मोक्याच्या जागी स्थित आहे, यामुळे या संपूर्ण परिसरात तीचे महत्त्व  अधोरेखित होते. पूर्वी, धार्मिक विधींचा भाग म्हणून, लोक मंदिरात प्रवेश करण्यापूर्वी बारवेमध्ये स्नान करत असत. यामागे अशी श्रध्दा होती की अशा धार्मिक स्नानामुळे त्यांचे पाप धुऊन मंदिरात प्रवेश करण्यापूर्वी शुचिर्भुत होता येईल.
 
 

 
 Diagram explaining the position of
 मंदिर संकुलातील बारवची स्थिती  

 हि बारव चौकोनी आकाराची आहे ज्याच्या बाजू वरच्या बाजूची लांबी २१ मीटर आणि तळाशी १४ मीटर आहेत, आतमध्ये बेसाल्ट खडकात कोरलेल्या पायऱ्यांची बांधल्या आहेत. बारवचे प्रवेशद्वार दक्षिणेकडून आहे. बारव त्याच्या बाजुच्या भिंतीमुळे आकर्षक दिसते ज्यामध्ये  देवकोष्ट (कोनाडे) आणि एक मंडप (मंडप) आहे. बारवेची दोन मीटर उंच संरक्षक भिंत एक प्रकारची तटबंदी म्हणून काम करते, त्यात २४ आकर्षक देवकोष्टे आहेत. एकेकाळी, त्यांत वेगवेगळ्या स्वरूपात विष्णूच्या मूर्ती ठेवल्या होत्या. त्यामुळे इथे येणार्या लोकांना बारवेच्या पवित्रतेची जाणीव व्हायची आणि बारवेचे पाणी प्रदूषित करणाऱ्या कोणत्याही कृतींमध्ये केल्या जात नसत. अशा प्रकारच्या वास्तुशिल्पीय विशेषांमु़ळे लोकांमध्ये आरोग्य आणि स्वच्छतेच्या पाणी व्यवस्थापन पद्धतींना प्रोत्साहन देण्यासाठी धार्मिक आणि आध्यात्मिक कल्पनांचा प्रभावी वापर अधोरेखित होतो.
  लोणी भापकर येथील बारवेच्या बाह्य भिंतीमध्ये देवकोष्ट (कोनाडे).

  बारवे  पश्चिम बाजुला चार वर्तुळाकार खांबांवर उभा असलेला चौकोनी मंडप आहे. हा मंडप विष्णू मंदिराबाहेर असल्याने, एकेकाळी त्यात विष्णूच्या अवतारांपैकी एक असलेल्या वराहाची मूर्ती होती - ज्याचे डोके रानडुकराचे आणि शरीर माणसाचे होते. या मूर्तीचे (यज्ञवराहाचे ) अवशेष आज बारवच्या शेजारी असलेल्या झाडाखाली दिसतात. मूर्ती ठेवण्याव्यतिरिक्त, मंडपात लोकांना बसण्यासाठी एक पीठ आहे. मंडपाची बाह्य भिंतीवर शिल्पपट आहेत. शिल्पपटांमध्ये विष्णूच्या विविध अवतारांचे आणि रामायणातील दृश्य दाखवलेली आहेत.
  लोणी भापकर येथील बारव मंडपाच्या भिंतीवरील शिल्पपट
लोणी भापकर येथील यज्ञवराहाची मुर्ती 

 मंचर आणि लोणी भापकर येथील बारवेच्या रचनेमध्ये फरक असूनही, दोघांमध्ये काही समानता आहेत. थोडेफार नुकसान आणि झीज वगळता, दोन्ही बारव ६०० वर्षांनंतरही चांगल्या स्थितीत आहेत. आजही त्यांना भरपूर प्रमाणात सुरक्षित भूजल मिळते. या बाबी हे बारव बांधणाऱ्या लोकांचे अभियांत्रिकी कौशल्य आणि जलजलशास्त्रीय ज्ञान दर्शवितात. दुसरे म्हणजे, दोन्ही बारवांची काळजी त्यांच्या संबंधित स्थानिक लोकांकडून घेतली जाते. उदाहरणार्थ, २०१९ मध्ये, मंचरमधील काही पुरुषांनी बारव साफसफाई आणि गाळ काढण्यासाठी स्वयंसेवा केली, दरवर्षी दिवाळीत बारवांच्या पायऱ्यांवर तेलाचे दिवे लावले जातात.
मंचर येथे बारवांच्या पायऱ्यांवर लोक तेलाचे दिवे लावतात. (स्रोत: राऊत, धनेश, २०२२)

जेजुरी मधील अहिल्यादेवी होळकर तलाव(ता.पुरंदर जि.पुणे) : -

  जेजुरी पुण्यश्लोक अहिल्यादेवीं होळकर यांच्या कर्तुत्वाने पावन झालेली भूमी. याच जेजुरीमधील राणी अहिल्यादेवींच्या काही कार्यामधील एक उत्कृष्ट नमुना म्हणजेच पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर तलाव . राणी अहिल्यादेवी होळकर यांच्या काळातील अभियांत्रिकेचा व पाणी व्यवस्थापनाचा एक उत्कृष्ट नमूना आहे.
या तलाव्याचा निर्माण पुण्यश्लोक राणी अहिल्यादेवी होळकर यांनी सन १७७० केला. हा तलाव लोकमाता अहिल्यादेवी होळकर यांनी सासरे श्रीमंत सुभेदार मल्हारराव होळकर(प्रथम) व सासू श्रीमंत गौतमीबाई होळकर यांच्या स्मरणार्थ निर्माण केला म्हणून या तलावास "मल्हार-गौतमेश्वर तलाव" या नावाने देखील ओळखले जाते.जेजुरी गडाच्या बाजूला हा भव्य तलाव स्थित असून एकूण १८ एकर जागेमध्ये पसरलेला आहे.
अहिल्यादेवी होळकर यांनी बांधलेला भव्य तलाव 

 हा तलाव आकाराने चोकोनी असून चारीही बाजूने मजबूत घडीच्या दगडाने बांधलेला आहे. या तलाव्याच्या एका बाजूला चिंचणीची बाग असून जेव्हा आपल्या नजरेस हा तलाव पडतो तेव्हा आपल्या डोळ्याचे प्रारणे फिटून जीव थक्क झाल्याशिवाय राहत नाही. डोंगरावरील अनेक झऱ्याचे पाणी एकत्र करून शिस्तबद्ध पदधतिने तलाव्यामध्ये सोडण्यात आलेले आहे. डोंगरातील पाणी ज्या ठिकाणी तलाव्यात येते त्या ठिकाणी दगडांची खाली-वर या प्रकारे विशिष्ट्य पदधतीने मांडणी केलेली दिसते. तलाव्यामध्ये उतरण्यासाठी पूर्व व उत्तरेच्या बाजूला पायऱ्यांची सोय केलेली आहे. त्याचप्रकारे तलाव्यातील पाणी हे शेतीसाठी वापरण्यात यावे यासाठी पूर्व,उत्तर व दक्षिण या बाजूंना दगडी मोटेची सोय केलेली दिसते.तसेच तलाव्याच्या उत्तर व दक्षिण बाजूला तलाव्याला लागुनच दोन चौकोनी आकाराच्या विहिरी आहेत. या विहिरीचे बांधकाम दगडामध्ये असून त्यामधील दक्षिण बाजूच्या विहिरीवर शेतीसाठी पाणी उपसण्यासाठी दगडी मोटेची सोय केलेली आहे. याच विहिरीतील पाण्याचा उपयोग चिचणीच्या बागेसाठी होत असावा. तलाव्याच्या उत्तर बाजूला थोड्या अंतरावर अधुरे काम झालेले मंदिर पहावयास मिळते. या मंदिरामध्ये काही कोरीव पादुका पहावयास मिळतात तर काही कोरीव दगडी शिळा मंदिरासमोर हि बघायला मिळतात. या मंदिरासमोर एक छोटी दीपमाळ हि आहे.
तलावाच्या उत्तर बाजूला असलेली विहीर 
तलावाच्या दक्षिण बाजूला असलेली विहीर(चिंचेच्या बागेशेजारी) 

तलाव्याची पूर्व कडील बाजू हि तलाव्याची प्रमुख बाजू असून याच बाजूने दटयांच्या सहाय्याने तलाव्यातील पाणी हे गायमुख या जलकुंडामध्ये व जेजुरीतील तीन हौदामध्ये भूमिगत नळांद्वारे पोहचवले जात होते. त्यामुळे धुणे, अंघोळी व जनावरांसाठीचे पाणी दूरवर उपलब्ध होत होते. त्याचा वापर करून ते पुढे शेतीसाठी वापरले जात. त्यामुळे पाणी प्रदूषण होऊ नये म्हणून, पाणी वापरल्यानंतर त्याचा पुढे शेतीसाठी पुनर्वापर व्हावा हा विचार होता. 
तलावाच्या याच दटयांच्या माध्यमातून पाणी भूमिगत नळांना मिळत असे.

    दटयांच्या बाजूला तलाव्याच्या बंधरयावरच भूमिगत नळांद्वारे जाणाऱ्या पाण्यावरील हवेचा दाब कमी व्हावा व या भूमिगत नळांद्वारे पाण्याचा प्रवाह व्यवस्थित व्हावा यासाठी खास चौकोनी दगडात मांडणी केलेली दिसते,ती आज हि आहे. पूर्वकडील बाजूला असलेल्या दटयांची मांडणी हि आज ही पहावयास मिळते तसेच त्या दटयांमधील भूमिगत नळही नजरेस पडतात. फक्त पूर्वकडीलच बाजूने तलाव्याच्या तळापर्यंत पायऱ्यांची सोय केलेली आहे आणि याच पायऱ्यांच्या बाजूला असणाऱ्या भिंतीवर महाराजा होळकर इंदौर स्टेटचा संगमरवरी बोर्ड पहावयास मिळतो. दोन ठिकाणी तलाव्यामध्ये महाराजा होळकर इंदौर स्टेटचा बोर्ड आहे. पूर्वकडील एका बाजूने आपून तलाव्यात उतरल्यावर भव्य होळकर कालीन शिवपिंड पहावयास मिळते व या शिवपिंडेच्या बाजूला असलेल्या पूर्वेकडील तटबंदीवर विविध आकाराच्या दगडांची लक्षणीय मांडणी केलेली आहे.हि शिवपिंड राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या विद्यमानाने तयार झालेली असावी. या तलाव्याचा आजही फक्त जेजुरीच नाही तर आसपासच्या गावांना ही शेतीसाठी पाण्याचा उपयोग होतो. हा तलाव तयार करताना जो नवलात या प्रकारचा दगड सापडला त्याच दगडापासून जेजुरीगडाच्या पायऱ्या होळकर काळात बनवल्या गेल्या.
तलावात चारही बाजूने अशा प्रकारेचे मजबूत दगडी बांधकाम बघायला मिळते.   
तलाव्यामध्ये असलेला महाराजा होळकर इंदौर स्टेटचा बोर्ड 

 सन १९३९ ला या तलाव्यातील पाण्याचा उपयोग जेजुरीत पिण्यासाठी होऊ लागला. ही प्रमाणात आजही होत आहे. या तलाव्यामध्ये भव्य दगडी चौथरा पहावयास मिळतो. पुण्यश्लोक राणी अहिल्यादेवी होळकर यांच्या अनेक कार्यामधील एक उत्तम कार्य असलेला हा होळकर तलाव अभीयांत्रीकेचे भाग आहे. अशाप्रकारे विविध गुणांनी नटलेला हा होळकर तलाव आज घाणीच्या साम्रज्यात अडकलेला दिसतो. जेजुरी देवस्थान यांच्या वतीने येणाऱ्या यात्रेकरूंच्या अपुऱ्या सोयीमुळे तलाव्याच्या पश्चिम बाजूला मोठ्याप्रमाणात घाणीचे साम्राज्य दिसते. मात्र जो पर्यंत सूर्य,चंद्र आणि वारा आहे तो पर्यंत हा होळकर तलाव आपल्याला इंदोरची राणी अहिल्यादेवी होळकर यांच्या कर्तृत्वाची आणि व्यक्तिमत्वाची जाणिव करून देत राहणार हे नक्कीच.आजच्या या कलयुगात हि होळकर कालीन वास्तू दिमाखात उभी आहे.
*महत्त्वाचे:-
१. गायमुख या जलकुंडाचा निर्माण राणी अहिल्यादेवी होळकर यांनी सन १७७० ला केला होत मात्र त्या गायमुखाच्या भिंतीचा वापर करून आज त्यावर भक्त निवास उभारले आहे. गायमुखाच्या पूर्वीच्या काही भिंती बाहेरील व आतील बाजूस पहावयास मिळतात. 
२.चिचणीच्या बागेचा निर्माण राणी अहिल्यादेवी होळकर यांनी भक्तांच्या सोयी केला होता.

शिरवळची प्राचीन पाणपोयी :-    

   पुण्याहून सातार्‍याला येताना निरानदी ओलांडली की सातार्‍याची हद्द सुरू होते. तिथून पुढे उजव्या बाजूला नायगाव फाट्यावर मोडकळीस आलेल्या मंदिरासारखी वास्तू दिसते. दुर्दैवाने ते मंदिर नसून ती पाणपोई आहे. पाषाणात कोरेलेली ही पाणपोई सुमारे हजार ते बाराशे वर्षे जुनी असून, संवर्धनाअभावी ढासळण्याच्या मार्गावर आली आहे.
     सातारा जिल्ह्याला ऐतिहासिक वारसा लाभला असून, आजही अनेक पुरातन वास्तू, मंदिरे, शिल्प इतिहासाची साक्ष देत उभ्या आहेत.


त्यापैकी एक असलेली शिरवळजवळील पाषाणात कोरलेली पाणपोई. ही पाणपोई सुमारे हजार ते बाराशे वर्षांपूर्वी ‘जकात पिव्हई’ म्हणजे जकात नाक्यावर केलेली असावी. अखंड पाषाणात कोरलेले दोन खांब, त्यामागे घडवलेले मोठे पाषाण एकमेकांवर रचून खोली तयार केली आहे. छतही एकमेकांवर दगडी रचून तयार करण्यात आले आहे. आतमध्ये जमिनीशी समतल दोन रांजण असून ते दगडी आहेत. हे सारे बांधकाम ‘शुषकसांधा’ पद्धतीचे म्हणजे कोणतेही चुना वा सिमेंट सारखे पदार्थ न वापरता करण्यात आले आहे.
   अठराव्या शतकात खंबाटकीच्या खांबटाक्यापासून ते सिंहगडाच्या दरम्यान शिवपर्वानंतर मराठयांनी गनिमांशी बावीस वेळा लढाया केल्या. रावजी पंत चिटणीसांच्या बखरीत या लढायांचे बरेचसे वर्णन आले आहे. तंजावर आणि बेंगलोरच्या मराठी सदरे वर जाताना सैनिकांच्या मोहिमांसाठी शिरवळ गावाच्या हद्दीवर पाणपोई उभारण्याची सूचना दस्तुरखुद्ध श्रीमंत नानासाहेब पेशवे यांनी केली होती. या पाणपोईला सव्वादोनशे वर्षाचा इतिहास असून या पाणपोईची रचना ही हेमाडपंती देवळाच्या धर्तीवर करण्यात आली आहे. या पाणपोईसाठी पगारी सेवक ठेवले जात असत. या पाणपोईत चार हंड्यांची व्यवस्था होती. सातारा-नायगाव-सारोळा-धांगवडी-कामथडी येथे पाणपोयांची रचना अस्तित्वात होती. मात्र शिरवळ हद्दीतील हेमाडपंती शैलीची ही पाणपोई मात्र व विशेष रचनेमुळे येणाऱ्या जाणाऱ्याचे लक्ष वेधून घेई. मात्र हा ऐतिहासिक ठेवा आज देखभालीअभावी दुर्लक्षित आहे. 
     सदर पाणपोईची रचना व त्याच्या व्यवस्थेच्या आदेशाबाबतचे लेखी पत्र नानासाहेब पेशवे यांनी शिरवळच्या सरदारांना धाडले होते. ते पत्र प्राध्यापक सचिन जोशी यांच्या संग्रहात आहे. या पाणपोई च्या बांधकामासाठी दगड गूळ, चुना, हरभरे, इ. साहित्य पुण्यावरून शिरवळला रवाना करण्यात आल्याचा ऐतिहासिक संदर्भ आहे. पुरातन पाणपोई कोणत्याही प्रकारचा चुना अथवा सिमेंटसारखे पदार्थ न वापरता केवळ गुरुत्वबल वापरून उभारण्यात आली आहे. त्यातील एखादा दगड जरी पडला तरी ही वास्तू पुन्हा आहे तशी उभारणे अवघड आहे. या पाणपोईच्या दगडी एकमेकांपासून वेगळ्या होण्यास सुरुवात झाली आहे.
       पुणे-बेंगलोर महामार्गाच्या सहापदरीकरणाला या पुरातन वास्तूचा अडथळा निर्माण होत आहे. त्यामुळे रस्त्याचे रुंदीकरण करताना या पाणपोईच्या भोवतालीच खोदकाम करून रस्ता तयार करण्यात आला आहे. या खोदकामामुळे पाणपोईची दगडी ढासळण्याची चिन्हे निर्माण झाली आहे. पुणे-सातारा महामार्ग सहापदरीकरणाचे काम झटपट उरकण्याच्या तयारीत रस्ते विकास महामंडळ असून ही पाणपोई अगदी रस्त्यातच आली आहे. महामार्गावर विनाकारण अपघात नको म्हणून ही पाणपोई हटवण्याची सुप्त गडबड कानांवर गेल्याने शिरवळ ग्रामस्थ संतप्त झाले आहेत. या वास्तूचे संवर्धन व्हावे या मागणीसाठी रायरेश्वर प्रतिष्ठान शिरवळ व गड किल्ले संवर्धन समितीने विशेष प्रयत्न सुरू ठेवले आहेत. पुरातत्व खात्याच्या परवानगीनंतर या पाणपोईच्या रेखांकनाचे काम प्रतिष्ठानच्या वतीने नुकतेच पूर्ण करण्यात आले. डेक्कन कॉलेजचे प्राध्यापक सचिन जोशी व वास्तूविशारद राहूल चेंबूनकर यांच्या सहकार्याने हे रेखांकन करण्यात आले असून याचा अहवाल राज्यसरकारकडे सादर करण्यात आला आहे. त्यानंतर या वास्तूची पुनर्बांधणी करण्याचा प्रस्ताव सादर करण्यात येणार आहे.
      धर्मशाळा बांधणे, पाणपोया उभारणे या संकल्पना कालबाह्य होत चालल्या आहे; पण मानवतावादी, सांस्कृतिक वारशाची साक्ष देणाºया वास्तू वाचविल्या पाहिजेत. त्यामुळे पुढच्या पिढीला किमान त्याची तोंडओळख तरी होईल.

लिंब बारामोटेची विहिर   

     मानवी वसाहती ह्या जलसंस्कृतीच्या काठावर वसल्या आणि हजारो वर्ष विकसित होत राहिल्या. पाणी ही मानवाची प्रमुख गरज असल्याने पाण्यास "जीवन" हे नाव दिले असावे. नदी, तलाव, तळी, विहिरी ह्या मानवी जीवनातील पाण्याची महत्त्वाची गरज पूर्ण करणारी साधन आहेत, पण प्रत्येक ठिकाणी पाणी उपलब्ध होईलच हे शक्य नसल्यामुळे मानवाने डोंगराच्या उतारादरम्यान तळी निर्माण करणे, गावाशेजारील ओढ्यास बंधारा बांधणे, इत्यादी माध्यमातून पाण्याची उपलब्धता करून आपल्या दैनंदिन जीवनात वापरासाठी व शेतीसाठी नियोजन केल्याचे दिसून येते.
    पाण्यासाठी योग्य ठिकाणी विहीर, बारव, आड खोदण्याची परंपरा फार प्राचीनकाळापासून अस्तित्वात आहे. शिवकाळात देखील प्रत्येक किल्ल्यावर पाण्याच्या सुविधेला जाणीवपूर्वक विशेष महत्त्व दिले होते. परकीय आक्रमाकांच्या प्रतिकारासाठी लढाऊ सैन्य, दारुगोळा, शस्त्रास्त्र जसे महत्त्वाचे होते, तसेच अन्नधान्य व पाणी हे आपल्या सैन्याची ताकद होती. शिवकाळात राजमाता जिजाऊ ह्या आपल्या द्वितीय पुत्र छ. शिवाजी महाराजांना घेऊन पुण्याच्या जहागिरीचा कारभार पाहात होत्या. बाल शिवबासह खेडे बारे येथे त्या वास्तव्यास असताना, शाहजी राजांच्या नावाची पेठ व आंब्याची बाग " शहाबाग" निर्माण केली होती. आब्याच्या बागेला व मानवी वसाहतीस मुबलक पाणी मिळावे म्हणून त्यांनी छोटेखानी धरण देखील बांधले होते. शिवकाळातील आंब्याच्या बागेमुळे आजही हे ठिकाण "शिवापूर बाग" याच नावाने ओळखले जाते. मध्ययुगीन ऐतिहासिक कालखंडातील आंब्याच्या बागेसाठी पाण्याची व्यवस्था करणारी पहिली कर्तबगार महिला ह्या जिजाऊसाहेब असू शकतात.
     इतिहासाची पुनरावृत्ती होत असते, याचीच प्रचिती सुमारे शंभर वर्षांनी झाल्याचे इतिहासाने पाहिले आहे. स्वराज्याच्या सातारा गादीचे छत्रपति शिवाजी उर्फ शाहू महाराजांच्या काळात श्रीमंत विरुबाई भोसले या कर्तबगार महिलेने लिंब (शेरी वस्ती.सातारा) येथे कृष्णा नदीच्या लगतच बारा मोटेच्या विहिरीची निर्मिती केली. छ. शाहू महाराज, महाराणी येसूबाईसाहेब व इतर कुटुंबातील सदस्य मोगल बादशहा औरंगजेबाच्या कैदेत असताना बादशहाने छ. शाहूला मुलगी दाखविण्यासाठी रूपवान अशा विरूबाईस पाठविले. पुढे शाहू महाराजांचे सगुणाबाई व सकवारबाई यांच्याशी विवाह झाले मात्र विरूबाई या उपस्त्री म्हणूनच त्यांच्याकडेच राहिल्या. २० फेब्रुवारी १७०७ मधे अहमदनगर जवळच असलेल्या भिंगार येथे औरंगजेबाचा नैराश्य व वृद्धापकाळाने मृत्यू झाला. औरंगजेबाच्या मृत्यूमुळे त्याच्या मुलांमधे दिल्लीच्या गादीसाठी यादवी सुरू झाली. शहाआलम उर्फ बहादुर शहा या औरंगजेबाच्या मुलाने मुघलांच्या गादीचा वारस म्हणून ५ मार्च १७०७ ला स्वतःस  राज्यारोहन करून मुघल राजधानी दिल्लीच्या दिशेने प्रवास सुरू केला. परतीच्या वाटेवर असताना दारोहा येथून शाहू महाराजांची काही अटी व शर्थीवर सुटका केली व महाराणी येसूबाईसाहेब, विरूबाई व इतरांना आपल्याबरोबर पुढे दिल्ली येथे नेले. पुढील काळात छ. शाहूंनी सातारा येथे मराठा राज्याची राजधानी निर्माण केली परंतु मातोश्री व इतर कुटुंब कबिला हा मोगलांच्याच ताब्यात दिल्ली येथे होता. या सर्वांना सोडविण्याची संधी दिल्लीच्या कारभारातील प्रमुख असलेल्या सय्यद बंधूंच्या निमित्ताने आली. पहिले पेशवे बाळाजी विश्वनाथ भट यांनी येसूबाईसाहेब, रक्षा बिरूबाई व इतरांना इ. स. १७१९ मधे दिल्ली येथून मोगल कैदेतून मुक्त करून सातारा येथे आणले. अशा या बिरूबाई भोसले यांच्याकडे छ. शाहू महाराजांच्या दरूणी महालाची ( जनानखाना) व्यवस्था होती. सर्व तिच्या आज्ञेत वागत. फत्तेसिंह भोसले यांच्यावर तर तिचे पुत्रवत प्रेम होते. दरूणी महालात खोजा म्हणून असलेला वाणी जातीचा बसवंतराव कासुरडे व बिरूबाई एकाच जातीचे असल्याने त्यांना एकमेकांप्रती विशेष अभिमान होता.  बिरूबाई भोसले यांनी लिंब येथे बांधलेल्या विहिरीच्या शेजारीच बसवंतराव कासुरडे याने एक टोलेजंग वाडा बांधला होता, मात्र आजमितीस तो अस्तित्वात नाही. बिरूबाई भोसले यांनी परळी ( सज्जनगड) येथे समर्थ रामदास स्वामींच्या समाधीसमोर आपल्या नावाने भव्य तुळशीवृंदावन व शंभू महादेवासमोर दगडी दीपमाळ स्वखर्चातून बांधल्याची नोंद आढळून येते. लिंब येथील बारा मोटेच्या विहीरीच्या परिसरात सुमारे  ३०० आंब्याची बाग लावली होती. या बागेला बारमाही पाणी मिळावे म्हणून इ. स. १७१९ - १७४० च्या दरम्यानच्या कालखंडात ही विहीर तयार करण्यात आली असावी. अष्टाकोनी साठ फूट व्यासाच्या विहिरीस पाणी उपसा करण्यासाठी बारा मोट असल्यामुळे, या विहीरीला "बारा मोटेची विहीर" म्हणून संबोधण्यात येते. हिची खोली १०० फूट व व्यास ६० फूट असून संपूर्ण बांधकाम घडीव दगडात केलेले आहे.  आजही ती सुस्थितीत आहे. बारा महिने या विहिरीला पाणी असते. विहिरीचे बांधकाम कोरीव दगडात आहे. विहिरीचा आकार अष्टकोणी असून एखाद्या शिवलिंगा सारखा भासतो.  विहिरीचे दोन भाग आहेत अष्टकोनी आकाराची मुख्य विहीर आणि तिला जोडणारी उप विहिर चौकोनी  आकाराची आहे. 
    सातारा शहरापासून सुमारे 15 किलोमीटर अंतरावर लिंब हे गाव आहे. हे गाव सध्या 

             संग्रही असलेला ड्रोन द्वारे घेतलेला विहिरीचा फोटो. मुख्य विहिरीचा अष्टकोणी आकार तर उप विहिरीचा चौकोनी आकार

                        
           विहिरीत उतरण्यासाठी दगडी फरसबंदी पायऱ्या आहेत तर आत उतरण्या अगोदर विहीरीच्या आकारमानाकडे पाहिल्यास भगवान शंकराच्या पिंडीच्या आकाराची ही विहीर असल्याचे सहजच लक्षात येते. काही पायऱ्या उतरुन गेल्यावर चौकोनी आकाराच्या तटबंदीत आल्याचे जाणवते. शेवटच्या पायरीपासून दगडी साकव लागतो. साकवाच्या दोन्हीही बाजूला रूंद दगडी बांधकामातील आयताकृती भलेमोठे हौद असावे असा देखावा दिसतो, तर त्या हौदात उतरणा-या लहान पायऱ्या आपले लक्ष वेधून घेतात. आपण ज्या दगडी साकवावर उभे असतो त्याच्या खाली कमानीचा भाग दोन्ही हौदांना जोडणारा पाहून तत्कालीन स्थपत्तीच्या (बांधकाम अभियंता) ज्ञानाचा आवाका किती असेल याचा अंदाज येतो. याच कमानीवर वीरूबाईंनी ही विहीर बांधली असल्याचा शिलालेख कोरलेला आहे.  शेवटच्या पायरी वरुन सपाट दगडी फरसबंदीवर पाय ठेवल्या बरोबर समोर दिसणारे दृश्य अचंबित करणारे आहे. मुख्य विहिरीला जोडणारा दगडी कमानी भाग, तर त्याच्यावर दगडी खांबाचा नक्षीदार सज्जा

a

a

a


a

a






 









    मुख्यविहिरीत उतरण्यासाठी दोन्ही बाजूला जिने आहेत ते एका महाल वजा हॉलमध्ये निघतात. येथे खांबावर गणेश , मारुती , अश्वारूढ छत्रपती शिवाजी महाराज यांची शिल्पे कोरलेली आहेत. 
विविध पक्षी, चित्रे ही दगडी भिंतीतून बाहेर डोकावताना पाहून आपल्या पूर्वजांच्या कलासक्त जीवनशैलीचा प्रत्यय आल्याशिवाय राहत नाही. कमानीच्या दोन्ही बाजूची गजशिल्प वैभवशाली अभिरुचीची साक्ष देते. पुढे चालत गेल्यावर कमानीतून विहिरीचे पाणी पाहून आनंद वाटतो, तर कमानीच्या भिंतीच्या दोन्ही बाजूला लहान दगडी दादर असून त्याद्वारे आपण नक्षीदार दगडी खांबावर आधारलेल्या आयताकृती महालात प्रवेश करतो. भर उन्हाळ्यात देखील येथील वातावरण शितल असते. आता एका सज्जातून विहिरीतील पाणी दिसते, तर दुसऱ्या सज्जातून पायऱ्या उतरुण आलेली कमान व ती चौकोनी  दगडी भिंतीतील साकव दिसतो. विहिरीतील एकच पाणी मात्र खालच्या कमानी, दगडी महल व मोटेच्या ठिकाणाहून वेगवेगळे भासते.







a

a








 






  आता दगडी महलातील सौंदर्य पाहिल्यावर पूर्वेस एक दगडी दादर आहे, त्यातून वर आल्यावर आपण विहिरीच्या भूपृष्ठावर असतो. विहीर बांधकामात वरच्या अंतर्गत भागात चार दिशेला चार शिल्प दिसून येतात. गजावर आरुढ झालेला शरभ आहे. हे शिल्प शक्तीवर विजय मिळविल्याचे बुद्धी चापल्य दर्शविते.

a

वीरुबाईसाहेबांचा शिलालेखमोटेखालती असलेले शरभ

a

a












पेशव्यांच्या, शाहुंच्या अनेक खासगी बैठकी, निवांत क्षण यांना साक्ष असलेली ही विहीर प्रसिद्ध झाली, ती तिच्या भिंतीवर कोरलेल्या व्याल आणि शलभ शिल्पांमुळे! व्याल म्हणजे वाघाचे तोंड आणि सिंहाचं शरीर. ही शिल्पं राज्याची समृद्धी आणि पराक्रमाचं प्रतीक ठरतात. विहीरीच्या दक्षिण दिशेला ४ हत्तींवर आरूढ झालेल्या वाघाचं शिल्प दक्षिणेतील मराठ्यांचे वर्चस्व प्रदर्शित करते आणि उत्तरेकडे असलेली झेपावणारी व्याघ्र शिल्पं पुढच्या उत्तरेकडील मोहिमेचा संकेत देतात. अष्टकोनी विहीरीच्या प्रत्येक कोनात नागदेवतेची मूर्ती आहे. विहीरीतील खासे बैठकीत कमळ, हत्ती, गणपती, मारुती ही शुभ चिन्हं चितारली आहेत. घुमटाकार चौकटींना पडदे अडकवण्यासाठीच्या  खुंट्या पण आहेत. महाराजांची गोपनीय खलबतं करण्याची ही जागा असावी असा समज आहे. विहिरीच्या वरच्या बाजूस पत्थरात  घडवलेले आसन आहे  ज्याच्यावर बसून शाहूमहाराज रयतेशी  हितगुज करत. हे कातळ  पत्थरातील  शिल्प पाहून, शिवकालीन आपली स्थापत्यकला किती प्रगत होती याचा अभिमान वाटतो.विहीर बांधताना दगड एकमेकांना जोडण्यासाठी चुना सिमेंट अशा कोणत्याही गोष्टीचा वापर केला नाही. संपूर्ण दगडातून अतिशय कोरीव शिल्प उभं केलं आहे.     
a














या विहिरीचे संपूर्ण बांधकाम चुण्यामध्ये केले असल्याने ते इतक्या वर्षानंतरही भक्कम आहे. हिच्या निर्मितीसाठी चांगल्या प्रतीचा दगड वापरण्यात आला आहे. यासाठी डोंगरातून खाण लावून दगड घडविले असतील. दगडी खाणीपासून विहिरस्थळापर्यत अवजड घडीव दगड आणण्याचे कठीण काम करावे लागले असेल. मनात प्रश्न येतो की, कशी केली असेल दगडांची वाहतूक ? मला ही हा प्रश्न पडला. मग मी विचार करु लागलो आणि काहीतरी शोधू लागलो. तर विहिरीच्या पायऱ्या उतरण्यासाठी सुरवात करतो, तेथे उजव्या हाताला काही अंतरावर दोन दगडी चाके असल्याचे दिसून आले. प्रश्ना शेजारीच उत्तर ! गाडबगाडेच्या गाड्यास देखील असेच दगडी चाक असते. बैठ्या लाकडी बैलगाड्यास दगड वाहतूक करण्यासाठी अशी भक्कम दगडी चाके पूर्वी वापरात होती. अशा या कर्तबगार रक्षा बिरूबाई भोसले यांचे सातारा दरबारी कामकाजात विशेष महत्त्व असल्याचे काही प्रसंगात दिसून येत होते, कारण पहिले पेशवे बाळाजी विश्वनाथ यांच्या निधनानंतर दुसरे पेशवे म्हणून त्यांचेच पुत्र बाजीराव बाळाजी यांना छ. शाहू महाराजांनी पेशवाईचे वस्त्रे दिल्यावर, रक्षा बिरूबाईने पेशवा बाजीराव पंडित यांस ११० रुपये किंमची व चिमाजी अप्पा पंडित यांस १०० रुपयेची वस्त्रे भेट म्हणून दिली होती. अशी ही कर्तबगार रक्षा बिरूबाई भोसले २४ डिसेंबर १७४० रोजी निधन पावली आणि त्याचवर्षी म्हणजे इ. स. १७४० मधे पेशवे बाजीराव व त्यांचे बंधू चिमाजी अप्पा देखील परलोकवासी झाले. शिखर शिंगणापूरच्या शंभू महादेव मंदिराच्या ओव-यात वीरूबाईंचा मानसपुत्र फत्तेसिंह भोसले यांनी त्यांच्या स्मरणार्थ शिवलिंग स्थापन केल्याचा उल्लेख ' श्रीमंत महाराज भोसले बखर' मधे येतो. 









लिंब हे गाव बारा मोटेच्या विहिरीमुळे इतिहासात प्रसिद्ध असले तरी काही कटू आठवणी देखील आहेत. इंग्रज राजवटीच्या सुरूवातीच्या काळात सातारा गादीवर छत्रपति प्रतापसिंह महाराज होते. इंग्रज प्रतिनिधी म्हणून सातारच्या दरबारात ग्रॅड डफ हा अधिकारी होता. इंग्रज सरकारला छत्रपतींची अडचण होत होती, म्हणून काहीतरी खोटे आरोप करुन ४ सप्टेंबर १८३९ ला मध्यरात्रीस सातारच्या छत्रपतींना मुंबई इलाख्याचे गव्हर्नर कारन्याक याच्या हुकूमाने व क्रिस्टाल याच्या मार्गदर्शनाखाली ओवान्स या अधिकाऱ्याने अर्ध्या रात्री छत्रपतींना अटक केली. छत्रपतींना सातार जवळच्या लिंब येथील एका पाटलाच्या गाई गुरांच्या गोठ्यात ठेवले. इंग्रजी कैदेत छत्रपति ९३ दिवस या लिंब गावी गोठ्यात मुक्कामाला होते. ज्या इंग्रजांच्या प्रतिनिधीने  छ. शिवाजी महाराजांना कमरेत वाकून मुजरा करुन नजराना भेट केला, त्यांच्याच वंशाजांच्या हातांनी स्वराज्याच्या छत्रपतींना अटक करून लिंब येथे ठेवले. बारा मोटेची विहीर आठवताना, न कळतच आमच्या स्वराज्याच्या अपमान करणाऱ्या कपटी, धूर्त इंग्रजांची काळी कृत्य मनाला वेदना देतात.










    विहिरीतील स्वच्छ पाण्यात पोहण्याचा आनंद घेऊ शकता, परंतु विहीर अतिशय खोल असल्याने काळजी घ्यावी. ज्यांना पोहायला जमत नाही अशांनी पाण्यात उतरू नये.

पुण्यापासून NH4(पुणे-सातारा-बेंगलोर) हायवे वरुण  साधारण १००किमी अंतरावर डावीकडे 'लिंब फाटा' लागतो.(हा फाटा अनेवाड़ी टोलनाक्या-पासून 3 किमी पुढे आहे ).हायवेपासुन आत २ किमी आत लिंब गाव असून येथून पुन्हा १ किमी अंतरावर उजविकड़ील बाजुस 'शेरी' नावाचा परीसर आहे. येथेच विहीर पहावयास मिळेल.


अलिकडे सोशल मेडीयाच्या कृपेने हि विहीर प्रसिध्द झालेली असली तरी लिंब गावात असलेला कृष्णा नदीवरचा घाट आणि पेशवेकालीन मंदिरे आवर्जून पहाण्यासारखी आहेत.   लिंब गावात कृष्णा नदीचा बांधीव घाट आपटे, ठाकूर या सरदारांचे वाडे अजूनही वासे टिकवून आहेत. गावाला नदीकाठ असल्यामुळे गौतम, अगस्त्य, परशुराम ऋषी यांच्या वास्तव्याचे दाखले मिळतात. रामेश्वर, कोटेश्वर, भार्गवरामाचं अतिप्राचीन मंदिर त्याची स्थापत्य शैली पाहण्यासारखी आहे. साहित्यिकांच्या भाषेत सर्वसंपन्न आदर्श आणि कवी कल्पनेतलं गाव अशी याची ख्याती आहे.शिवाय लिंब गावात पेरुच्या बागा आहेत.पेरुच्या मोसमात गेल्यास आवर्जून पेरु खावेत.

 गुरसाळेचे रामेश्वर मंदिर :- 

खटाव तालुक्यात गुरसाळे येथील रामेश्वराचे मंदिर, कातरखटाव येथील कात्रेश्वराचे मंदिर व सातारा तालुक्यातील परळी येथील केदारेश्वराचे मंदिरही काम शिल्पांसाठी प्रसिद्ध आहे.या मंदिरांवर कोरलेल्या कामशिल्पांमुळेच ही मंदिरे महाराष्ट्रातील खजुराहो म्हणून अल्प परिचित आहेत. मंदिरावर कामशिल्पे का असावीत, याबाबत संशोधकांचे वेगवेगळे मतप्रवाह आहेत. परंतु ही मंदिरे तांत्रिक उपासना सांप्रदायाच्या प्रभाव असणाऱ्या काळात उभारली गेली, यावर बहुतांश संशोधकांचे एकमत आहे. मद्य, मांस, मस्य, मुद्रा व मैथुनी या पाच गोष्टींना मिळून पंचमकार अशी संज्ञा तयार होते. याच गोष्टीचे वा उपासनामार्गाचे शिल्पांकन सातार्यातील या तीन मंदिरांवर केलेले आढळते.
       वडूज-कराड मार्गापासून ५ किलोमीटर अंतरावर गुरसाळे हे गाव आहे.तिथलं मंदिर आणि त्याच्या समोरच भव्य पुष्करणी. त्याची रचना पाहिली की पुणे जिल्ह्यातील बारामतीजवळील लोणीभापकरच्या मंदिराची आठवण येते. स्थानिक रहिवाशांच्या माहितीनुसार, ही वास्तू फार पूर्वीची, कदाचित शिवकालीन असावी. हा सारा परिसरच 'रामलिंग' या नावाने ओळखला जातो. त्याच ठिकाणी ही शिवकालीन पुष्करणी किंवा बारव आहे.






या मंदिराच्या प्रांगणात असणारी पु्ष्करणी हे आणखी एक वैशिष्ट्य. पुष्करणी किंवा बारव म्हणजे चौकोनी आकाराचा उतरत्या पायºयांची रचना केलेले कुंड. महाराष्ट्र शासनाने वर्षांपूर्वी हे मंदिर ऐतिहासिक पर्यटन स्थळ म्हणून घोषित केलं. मध्यतंरी बारवेची स्वच्छता करण्यात आली. त्यावेळेस अहिल्याबाई होळकरांचा वंशज श्री. यश होळकर उपस्थित होते. या बारवेचं दगडी बांधकाम मोडकळीस आलंय. गुरसाळे गावामध्ये सोमलिंग, गुपितलिंग, रामलिंग, भावलिंग, शिवलिंग अशी एकूण पाच लिंग आहेत. ही पाच शिवलिंग पूजली जातात. तिथं महाशिवरात्रीला मोठ्या उत्साहात यात्रा भरवली जाते.हा वारसा आणखी किती दिवस टिकणार हा प्रश्न आहेच..

पायर्‍यांची विहीर( नकट्या रवळ्याची विहीर :-

सातवाहनकालीन प्राचीन वारसा लाभलेल्या कराड शहरातील पंताचा कोट या किल्ल्यात एक पायविहीर असून स्थानिक लोक तिला नकट्या रावळाची विहीर  या नावाने ओळखतात. विहीर किल्याच्या पश्चिम टोकास असून कोयना नदीच्या पात्रापासून सुमारे २४ मी उंचीवर आहे.विहीर म्हणजे जलस्त्रोताचे जिवंत झरे असतात, तसेच जलसंस्कृतीच्या ठिकाणी जलदेवता व इतर दैवतांचे कोरीव काम
साधारणतः सर्व जल उगम व साठा या ठिकाणी हमखास दृष्टीपथास येते, मात्र येथील  विहिरीत ना पाण्याचे झरे, ना जलदेवतांच्या कोरीव आकृती. या सर्व गोष्टींचा  अभाव असलेल्याने नक्की ही विहीर पाण्याच्या वापरासाठी निर्माण केली होती की इतर उद्देशाने याचा मनात संम्रभ निर्माण होतो. काहींच्या मते शत्रूच्या सैन्यापासून लपून राहण्यासाठी या विहिरीचा वापर होत असावा. कोयनानदीच्या पात्रतातून चुनेगच्ची खापरी जलवाहिकेच्या माध्यमाने येथे पाणी आणले असावे ही शक्यता वाटते, पण इतक्या भल्यामोठ्या विहिरीतील पाणी उपसा करण्यासाठी ना  रहाटाचे, ना मोटेचे हौदे असल्याचे पुरावे दिसत नाही.
        ही  विहीर सुमारे ४१.५ मी लांब असून त्यात ३०.५ मी लांबीचा सोपनमार्ग व खाली ११×११ मी चौरासकृती पाण्याची विहीर आहे. विहिरीचा ईशान्य बाजूकडील काही भाग  गोलाकार आहे.मात्र उद्देश किंवा उपयोग कशासाठी होत असावा याबाबत अनभिज्ञता  आहे. विहीरीच्या आत उतरण्यासाठी ८२ पायऱ्या आहेत. दर २० पायऱ्यानंतर एक मोठी पायरी आहे.  वीस पायऱ्या चढल्यावर किंवा उतरल्यावर विसावा घेण्यासाठी त्या केल्या असू शकतील.पहिल्या वीस पायऱ्या उतरून गेल्यावर विहिरीच्या  अंतर्गत तटबंदी बांधकामातून दोन्ही बाजूने एक माणूस विहिरीरच्या हौद्याकडे जाऊ शकेल अशी रचना आहे.  जेथे पायऱ्या संपतात तेथे दोन विशाल दगडी स्तंभावर  एक मोठी कमान उभारण्यात आली आहे. या कामानीत दोन उपमार्ग आहेत. या विहिरीचे बांधकाम दगडी चिरे आणि चुन्यात केले आहे. नदीच्या बाजूने नंतरच्या  काळात विटांनी एक धक्का बांधण्यात आला असावा. विहिरी बाबतची नोंद सन १७५० मध्ये उपलब्ध होती. या विहिरीचा उपयोग केवळ पाणी साठवण्यासाठी होत नसावा. 



   




  दगडी बांधकामात विशिष्ट अंतरावर सलगपणे खाचा ठेवलेल्या आहेत. त्यामुळे वेळप्रसंगी त्यात मोठ्या लाकडी किंवा लोखंडी तुळया ठसवून या विहिरीचे सहा ते सात मजल्यामध्ये परिवर्तन करणे शक्य होत असावे. आजही काही खाचत लाकडी तुळया दिसून येतात. तसेच त्या त्या टप्प्यावर उतरण्यासाठी जिने ठेवलेले आहेत. याशिवाय विहिरीच्या प्रवेश मार्गांवर मजबूत अशी दगडी भिंत उभारण्यात आलेली आहे. केवळ पाणी साठवण्यासाठी तिचा उपयोग होत नसावा किंवा शेजारची परिस्थिती पाहता शत्रूशी लढताना दबा धरून बसण्यासाठी ही जागा वाटत नाही.
अनेक मजली असलेली ही विहीर कदाचित महत्वाच्या वस्तूंचा साठा करण्यासाठी कोठार म्हणून उपयोग येत असावी.  विहिरीत खापरी पाटामार्फत (भाजलेल्‍या मातीचा पाईप किंवा पाट) कोयनेचे पाणी सोडले जात असावे. त्यामुळे तिची खोली कोयनेच्या पात्राइतकी असावी. अनेक मजल्यांच्या विहिरीचा उपयोग पाणीपुरवठ्यासाठी किंवा वस्तूंच्या साठ्यासाठी करत असावेत असे सातारा गॅझेटियर म्हणते.
ही प्राचीन वास्तू केंद्रीय पुरातत्त्व विभागाकडे राष्ट्रीय स्मारक म्हणून नोंद आहे. राष्ट्रीय स्मारकात आठ प्रकारची वर्गवारी असून नकट्या रावळ्याची विहीर ही सातव्या वर्गवारीतील असल्याचे सांगण्यात येते.
सध्या  या विहीर गाळाने भरुन गेली असल्याने पावसाळ्यात थोडे फार पाणी साठते. ईथे भुयार असून ते भुईकोटाबाहेर निघते असा समज आहे. वास्तविक असे भुयार असेल तर  त्यात ऑक्सिजनची कमरता, साप, विंचू अश्या विषारी जीवांचा वावर या सर्व गोष्टी विचारात घेता तथ्य नाही.
  कराडच्या वैभवशाली संस्कृतीचा वारसा असलेल्या या विहिरीला नकट्या रावळाची  विहीर हे नाव व तिचा नक्की वापर याबाबत पुरेशी माहिती उपलब्ध होत नसल्यामुळे मनात उत्सुकता निर्माण होते. काळाच्या उदरात गडप झालेले रहस्य शोधण्याचा इतिहास संशोधक नक्कीच प्रयत्न करतील अशी आशा वाटते.

 नेवरीतील बारव :-

सांगली जिल्ह्यातील कडेगांव हा तालुका राजकीय दृष्ट्या नेहमी सक्रिय असतो. याच कडेगांव आणि खानापूर तालुक्याच्या सीमेवर आहे नेवरी गाव. जसा राजकीय क्षेत्रात याचा छाप तसाच ऐतिहासिक बाबीत देखील या गावाचा ठसा दिसतो. नेवरी गावात बरेच जुने वाडे पाहायला मिळतात. या वाड्यांची स्थिती आजही उत्तम असून त्यांची देखभाल येथे राहणारे घेत असतात. येथे सिद्धनाथाची मोठी यात्रा भरते जी कडेगांव तालुक्यातील मोठी यात्रा म्हणून प्रसिध्द असून त्या दरम्यान रथयात्रा देखील काढली जाते. आजही गावच्या दक्षिण बाजूला ऐतिहासिक बारव , आमराई, व बाजूला हत्तीकुंड पाहायला मिळतो. नेवरी गावाच्या बाहेर एक पुरातन बारव आहे. सिद्धनाथ मंदिरा पासून सरळ पुढे गेलं की गावाच्या शेवटी शेतात एक पत्रा असणारे महादेव मंदिर आहे याच्या शेजारी ही बारव आपण बघू शकतो. या बारवेत उतरण्यासाठी दोन बाजूंनी समोरासमोर वाट आहे त्यामुळे हीचा समावेश भद्रा नावच्या बारव प्रकारात होतो. या बारवेला एक मोट देखील आहे जी नंतर बनवलेली दिसते. या मोटेचे दगड आणि त्यांच्या प्रकार बारवेसाठी वापरलेल्या दगडांच्या पेक्षा वेगळा आहे. तसेच मोटेचे आणि बारवेचे बांधकाम यात फरक जाणवतो. बारवेत एकूण १२ देवकोष्टके आहेत. पैकी फक्त एकात भग्न मूर्तीचे शेष भाग आहेत. मोटेतून दगडी पाटाच्या साहाय्याने पाणी जमिनीला आणि शेजारी असणाऱ्या दगडी टाक्यात पाणी सोडले जात. दोन दगडी टाक्या पूर्वी होत्या पैकी एक मोडकळीस आली आहे तर दुसरी सुस्थितीत आहे. यांचा वापर पाणी जनावरांना पाणी पाजण्यासाठी केला जात असावा. छत्रपती शिवरायांचे जावई हरजी राजे महाडिक यांचे बंधू व्यंकोजी राजे महाडिक यांनी हे गाव बसविले असे म्हटले जाते. याच सोबत हि बारव देखील व्यंकोजी राजेंनी बांधली असं सांगितले जाते. नेवरी गावातील आज बहुतांश कुटुंब महाडिक आडनावाची आहेत. या गावाच्या आसपास औरंगजेबाचा मुक्काम पडल्याचा उल्लेख मोगल दरबारच्या अखाबारात येतो. कालांतराने मुलुख वर्चस्वाने या गावात महाडिक व इंगवले यांच्यात सत्ता संघर्ष झाला व इंगवले लोकांना हे गाव सोडून जावे लागले (सध्या हे लोक कराड जवळील रिसवड या गावात राहतात)
बारव-barav-बावडी-नेवरी-nevari
बारव
बारव-barav-बावडी-नेवरी-nevari
हौद/ टाकी     

  हैदरखान विहीर,मिरज :-

मिरज शहराला मोठा ऐतिहासक वारसा असून अनेक वास्तू त्याची साक्ष देत असतात. येथेच आदिलशहाच्या काळात सरदार हैदरखान याने एक विहीर बांधली. सन १५८३ मध्ये बांधलेल्या या विहिरीला हैदरखान विहीर म्हणूनच ओळखले जाते. या विहीराचा आकार १५० बाय १५० फूट आकाराची व ६० फूट खोल असा आहे.

या विहिरीतून आसपासच्या शेतीला मोठ्या प्रमाणात पाणीपुरवठा होत होता. पुढे संस्थान काळातही या विहिरीच्या पाण्यावर मिरजेत शेती केली जात असल्याचे पुरावे आढळतात.मिरासाहेब दर्ग्यातील कारंजाला पाणी हैदरखान विहिरीतून एक दगडी पाईपलाईन मिरज शहरातील मिरासाहेब दर्ग्यात आणली होती. या ठिकाणी आणलेल्या पाण्याचे कारंजे तयार करण्यात आले होते. त्यासाठी विहिरीवर हत्तींची मोट वापरण्यात येत होती. या विहिरीमध्ये हत्तींना बांधण्यासाठी दगडी अंकुशही तयार करण्यात आले होते. विशेष म्हणजे आजही ते सुस्थितीत आहेत. १८८७ मध्ये हैदरखान विहीर रेल्वेच्या ताब्यात एकोणिसाव्या शतकाच्या उत्तरार्धात मिरजेत रेल्वे पोहोचली. तेव्हा १८८७ मध्ये हैदरखान विहिरीचा ताबा रेल्वेकडे आला. रेल्वेचे डबे धुणे, स्टेशनची स्वच्छता करणे यासारख्या कामांसाठी हैदरखान विहिरीच्या पाण्याचा वापर होत होता.सन २०१६ मध्ये मराठवाड्यात दुष्काळी स्थिती निर्माण झाली होती. लातूरला तीव्र पाणी टंचाई होती. तेव्हा मिरजेतील स्थानिक नेते मकरंद देशपांडे यांनी तत्कालिन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन एक योजना मांडली. मिरजेतील हैदरखान विहिरीतून लातूरला पाणी नेण्याच्या योजनेला मुख्यमंत्र्यांनी मान्यता दिली. जलपरी एक्स्प्रेस धावू लागली दुष्काळग्रस्त लातूरला मिरजेतून पाणी पुरवठा करण्याची योजनेला मान्यता मिळाली. त्यासाठी रेल्वेने हैदरखान विहिरीतील पाणी लातूरला नेण्यात येणार होते. रेल्वेनेही त्यासाठी परवानगी दिली. जलपरी एक्स्प्रेसच्या माध्यमातून रोज लाखो लिटर पाणी लातूरला पोहोचवले जावू लागले. सलग ४ महिने हैदरखान विहिरीतून लातूरला पाणीपुरवठा होत होता. ५०० वर्षे जुन्या असणाऱ्या हैदरखान विहिरीने लातूरकरांनाची तहान भागविली.शेकडो वर्षांपासून कित्येकांची तहान भागविणारी हैदरखान विहीर आता संकटात आहे. आसपासच्या लोकांनी विहिरीची कचराकुंडी केल्याने मोठ्या प्रमाणात कचरा साठला आहे. विहिरीच्या कठड्यावर झुडपे उगवल्याने ते पडण्याच्या स्थितीत आहेत. विहिरीची दुरावस्था झाल्याने ती अखेरच्या घटका मोजत आहे. मात्र याकडे प्रशासनाचे दूर्लक्ष आहे.

पांढर पाणी येथील विहिर :-

पन्हाळा ते पावनखिंड मोहिमे दरम्यान एक छोटस पांढरपाणी नावाच एक खेड गाव लागत हे गाव जरी छोट असल तरी या गावाचा इतिहास मोठा आहे. कारण जेव्हा छत्रपती शिवाजी महाराज पन्हाळा गडावरून निसटले आणि विशाळगडाकडे निघाले. त्यासंदर्भात इथे एक कथा या परिसरात सांगितली जाते. 




पहाटे शिवाजी महाराज या पांढरपाणी गावात पोहचले. इथे त्यांना  भुक लागली,, तेव्हा ह्या गावात थांबले होते व त्यांच्या जेवनाची सोय एका (माऊली) आजीबाईनीं केली होती. त्यांचे आडनाव चाचे होते असे समजते ,,महाराजांचे जेवण झाल्यावर महाराजांनी त्या माऊलीचे आभार मानले. आणि त्या माऊलींना विचारले "बोला तुम्हाला काय हवे आहे." तेव्हा ती माऊली म्हणाली आम्हाला दुसर काही नको, फक्त आम्हाला व आमच्या लेकरा बांळाना पिण्याच्या पाण्याची सोय करून द्या बस एवढच बाकी काही नको". पुढे शिवाजी महाराज विशाळगडाला सुरक्षित पोहचले आणि नंतर राजगडावर गेले. मात्र हा प्रसंग लक्षात ठेवून रांजानी दिलेला शब्द पाळला आणि इथे एक विहीर खोदून दिली. हिच ती शिवकालीन विहीर, जीला स्थानिक लोक 'शिवाजीची विहीर' म्हणतात. आज सुध्दा हि विहीर इतिहासाची साक्ष देत आहे. अजून या विहीरीची दुरुस्ती करायची गरज पडली नाही.अजून सुध्दा इथले लोक ह्याच विहिरीचे पाणी पितात.

किल्ले पन्हाळा गडावरची अष्टकोनी विहीर ( बाव ) / जलस्रोत...

किल्ले पन्हाळा गडावरची अष्टकोनी विहीर ( बाव ) / जलस्रोत...
दुर्ग पन्हाळा तर आपल्या सर्वांच्या परिचयाचा आहेच अनेकांनी या गडाच्या अक्षरशः वाऱ्या केल्या आहेत. तसे पाहायला गेलं तर पन्हाळ्यावरची अनेक ठिकाण, वास्तू आपल्याला तोंड पाठ आहेत तिकडे हमखास सर्वांची पावले ही वळतातच पण याच गडावरच अशी काही ठिकाण देखील आहेत जिकडे सहसा माहिती अभावी म्हणा किंवा वेळे अभावी म्हणा जाणे काहीजणांना होतच नाही. तर असच एक ठिकाण आहे ते म्हणजे किल्ले पन्हाळा गडावरील ही अष्ट कोणी विहीर ( पाण्याचा जलस्रोत )
किल्ले पन्हाळा गडावर छत्रपती संभाजीराजे दुसरे ( करवीर पाहिले ) यांचे मंदिर आहे. आता तुम्ही म्हणाल हे मंदिर कूट आहे तर सोमेश्वर तलाव पासून जवळच असणाऱ्या हुकूमतपन्हा रामचंद्रपंत अमात्य यांच्या समाधी समोरील भागात तर या मंदिराच्या मागील बाजूसच तट बंदिस्त आशा स्वरूपात आहे ही अष्टकोनी विहीर. मंदिराच्या डाव्या बाजूने चालत आपण पुढे गेलो की एका कोपऱ्यात दगडी तटबंदी सारखे छोटे बांधकाम आपल्याला पाहायला मिळते थोडेसे वळण घेऊन आपण पुढे गेलो की मग आपल्या नजरेस पडते ती ही सुंदर अशी विहीर ( बाव ) तिन्ही बाजूनी दगडी छावणीच उभारली असल्यामुळे जवळ गेल्याशिवाय या विहिरीचे अस्तित्व आपल्याला जाणवत नाही. तिथून खाली विहरित उतरण्यासाठी दगडी पायऱ्या बांधलेल्या आहेत. पायऱ्या उतरून आपण सरळ पोहोचतो ते या अष्टकोनी विहिरी जवळ (बावीजवळ ). या विहिरीचे मुख दगडात कलाकुसर काम करून अष्ट कोणी स्वरूपात बनवले आहे. यातील पाणी सुद्धा थंडगार , नितळ आणि पिण्यायोग्य असे सुंदर आहे. विहिरीच्या वरच्या भागात आणि बाजूने दगडी बंदिस्त स्वरूपातील बांधकाम असल्यामुळे या ठिकाणी पाण्यात कोणतीही घाण अथवा धूळ पडण्याची शक्यता खूप कमीच. विहिरीच्या बाहेरच्या भागात एक जुने दगडी भांडे देखील आपल्याला पाहायला मिळतेच. आमच्या शिवशक्ती प्रतिष्ठांनच्या स्वच्छता मोहीमा , भटकंती या निमित्ताने आजवर अनेक वेळा किल्ले पन्हाळा गडाची सफर ही ठरलेली आहेच मग सोबत असलेले मित्र मंडळींना घ्यायचं आणि ह्या आशा थोडे आड ठिकाणी दडलेल्या ठेव्याकड घेऊन जायचं हे ठरलेलं आहेच. बऱ्याच जणांना ह्या विहिरीविषयी माहिती नसावी कदाचित पण अतिशय सुंदर व थोडा वेगळा असा विहिरीचा हा ठेवा नक्की आवर्जून सर्वांनी पहावा असाच आहे.
सातप्पा स. कडव 

 चर्होली बु सरदार दाभाडे घराणे वंश

प्राचीनतेची साक्ष देणाऱ्या खंबाटकी घाटाची 'खांब टाक्यावरील खामजाई देवी :-

सह्याद्रीमध्ये  प्राचीनतेची साक्ष देणारी अनेक ठिकाणे दडलेली आहेत. हि सर्व प्राचीनतेची साक्ष देणारी ठिकाणे काही आडवाटांवर वसलेली आहेत तर काही मुख्य महामार्गांवर वसलेली आहेत. महाराष्ट्राच्या प्राचीनतेच्या इतिहासाची साक्ष देणारे एक ठिकाण वसलेले आहेत प्रत्यक्ष खंबाटकी घाटामध्ये. आता हा विचार कराल की खंबाटकी घाटामध्ये कोणते असे ठिकाण आहे कारण हा खंबाटकी घाट म्हणजे  मुंबई-बंगळूर(बेंगलोर) हमरस्त्यावरील प्रमुख घाट.
खंबाटकी घाटाच्या मध्यावर घाटदेवता 'खामजाई देवीचे' छोटेसे मंदिर आहे या मंदिराकडे जाताना येताना जास्त कोणाचे लक्ष देखील जात नाही हे 'खामजाई देवीचे' मंदिर ज्या ठिकाणी बांधलेले आहे ते दुसरे तिसरे काहीही नसून खंबाटकी घाटाची प्राचीनतेची साक्ष देणारे सुंदर 'खांब टाके' आहे. महाराष्ट्रामध्ये देशावरून कोकणात जाण्यासाठी या सर्व प्राचीन घाटवाटांचा वापर मोठ्या प्रमाणात होत असे त्या प्राचीनतेची साक्ष देत असलेला एक पुरातन घाट म्हणजे खंबाटकी घाट.
या  खंबाटकी घाटाचे पूर्वीचे नाव हे पारगाव खंडाळा या पायथ्याच्या नावामुळे खंडाळा घाट असे होते. या घाटाच्या मध्यावर असलेल्या खांब टाक्यांंमुळे हा घाट खंबाटकी घाट म्हणून ओळखला जाऊ लागला 'खांबटाकी घाट' या नावाचा अपभ्रंश होऊन खंबाटकी घाट असे नामकरण झाले आणि खंबाटकी घाट हे नाव सर्वश्रुत झाले. उत्तर आणि दक्षिण भारत जोडणारा हा एक प्रमुख प्राचीन घाटमार्ग आहे. तसेच खंबाटकी घाटाच्या आजूबाजूस असणाऱ्या शिरवळ आणि पारगाव खंडाळा येथील लेण्या यामुळे या घाटाचे महत्व भरपूर असावे असे दिसून येते.
खंबाटकी घाटाच्या अलीकडे यादव कालीन पाणपोई आहे तिचा आणि या घाटाचा संबंध जुळून येतो कारण त्या पाणपोई नंतर खंबाटकी घाटामध्ये ही पाण्याची टाकी आहेत हे आपल्याला दिसून येते. ही खांब टाकी कोणी कोणत्या काळात खोदली हे मात्र ठामपणे सांगता येत नाही. थोडासा ऐतिहासिक शोध घेतला असता इ.स.वी. १८ व्या शतकात पेशव्यांच्या काळामध्ये या घाटाचे महत्व खूप होते हे दिसून येते राबता मोठ्या प्रमाणात होता तेव्हा या घाटामध्ये असलेल्या खांबटाक्यांवर पेशव्यांचे गुरु 'ब्रम्हेंद्र स्वामी' यांनी त्याकाळामध्ये ४५ हजार रुपये खर्च करून या प्राचीन टाक्यांची डागडुजी केली याचा संदर्भ धावडशी येथे जी  'ब्रम्हेंद्र स्वामी' यांची समाधी आहे. तेथे फलकावर देखील याबाबत सविस्तर लिहिलेले आहे.
कोल्हापुरला  जाणाऱ्या बहुतांश गाड्या याठिकाणी  देवीच्या दर्शनासाठी थांबतात या प्राचीन टाक्यांमधील सुंदर आणि निर्मळ पाणी प्राचीन काळापासून आजही येणाऱ्या पांथस्थांंची तहान भागवत आहे. येणारे पांथस्थ हे आजही या खांबटाक्यामध्ये पैसे टाकतात मात्र लवकरच ही ऐतिहासिक खांबटाकी काळाच्या आड  होणार आहेत कारण रस्ता रुंदीकरणामुळे ही पाणटाकी नष्ट करत असून घाटामधील 
एका महत्वपूर्ण ऐतिहासिक वारश्याला आपण लवकरच मुकणार आहोत हे या रस्ता रुंदिकरणाने साध्य होणार आहे.
   अश्या या ऐतिहासिक वारश्याला आपण लवकरच मुकत आहोत. प्राचीन काळापासून प्रवाशांची तहान भागवणारी ही सुंदर 
टाकीमात्र लवकरच काळाच्या पडद्याआड होणार आहेत त्यामुळे भविष्यात प्रगतीच्या दिशेने आपण आपला ऐतिहासिक वारसा नष्ट करणार कि आपली ऐतिहासिकता पुसणार हा प्रश्न मात्र ही खांबटाकी पाहताना पडतो.

 संदर्भ :-
१. साळी, डॉ. चेतन शंकर – संदर्भ महाराष्ट्र, इंटेलक्चुअल बुक ब्युरो, भोपाळ, प्रथम आवृत्ती, २००५, पृष्ठ क्र. ७६४
२. जळगाव जिल्हा ग̆झेटयिर- मराठी आवृत्ती १९९४, पृष्ठ क्र. ५४-५५
३. साळी, शंकर अण्णाजी – ‘दि अप्पर प̆लिओलिथिक कल्चर अ̆ट पाटणे, डिस्ट्रीक्ट ग̆झेटयिर जळगाव, महाराष्ट्र’ रिसेंट अ̆डव्हान्सेस इन इंडो प̆सिफिक प्रिहिस्टरी, १९८५, पृ. क्र. १३९-१४०
४. कित्ता २, पृ. क्र. ५५
५. सकाळ वृत्तपत्र – दि. १ जानेवारी २०१७, गिरणेच्या काठावर आढळले ३७०० वर्षापूर्वीचे अवशेष
६. बोपर्डीकर, बी. पी. – ‘अर्लि स्टोन एज साईट अट मानेगाव ऑन दि पूर्णा रिव्हर, डिस्ट्रीक्ट ग̆झेटयिर जळगाव, महाराष्ट्र,’ इंडियन एन्टीक्वरी, खंड क्र. ४, १९७०, पृ. क्र. ८ – १२
७. कित्ता २ पृ. क्र. ६५
८. मराठी वांग्मयाचा इतिहास, खंड क्र. १, १९८४ पृ.क्र ६२४-२७
९. दिवेकर डॉ. ह. रा. – तत्वसार ग्रंथ, १९३६
१०. कित्ता ८ पृ. क्र. ३६६
११. शेरवानी, एच. के. व जोशी, पी. एम. (संपा.)- हिस्ट्री ऑफ मिडिव्हल डेक्कन, आंध्र गव्हर्न्मेंट प्रकाशन, प्रथम आवृत्ती, हैद्राबाद, १९७६, पृ. क्र. ६
१२. इब्नबतुता की भारत यात्रा – चौदहवी शताब्दी का भारत – नशनल बुक ट्रस्ट ऑफ इंडिया, नवी
दिल्ली, चौथी आवृत्ती, २००५, पृ.क्र. १८७.
१३. बोबडे, बी. आर. – तबकाते-ए-अकबरी व चचनामा, अरुणा प्रकाशन, लातूर, प्रथम आवृत्ती,
२०१७ (प्रकाशित तसेच मूळ हस्तलिखित उपलब्ध आहे)
१४. बोबडे, बी. आर. – मूळ हस्तलिखित उपलब्ध – लेखक हफिजुधीन अहमद, मूळ नाव गंज इ –मानी, तवारिखे दक्खन, २८९ पृष्ठे.
१५. कित्ता ११, पृ. क्र. २३२
१६. शहा, जी. बी. – पेशवेकालीन खानदेश- अप्रकाशित पीएच. डी. प्रबंध, पुणे विद्यापीठ, पुणे
१७. भामरे, डॉ. सर्जेराव – खानदेशातील अभिनव फड सिंचन पद्धत, जलसंवाद स्मरणिका, जानेवारी२०१८
१८.  http://www.chaturthamiti.in/2022/06/blog-post_13.html
१९. https://www.tarunbharat.net/Encyc/2023/6/4/-Barav-is-a-Masterpiece-of-Architecture.html
२०) सातारा गॅझेटीयर.
२१) मध्ययुगीन कालखंड- महाराष्ट्र राज्य सांस्कृतिक महामंडळ.
२२) अपराजितपृच्छा
२३) बृहत्कल्पसूत्रभाष्य
२४) Maharashtra gazatter
२५) G.B.Degulkar
२६) A.V. Naik
२७ ) Dandawate, P.P.; Joshi, P.S. and Gajul, B.S. 2006. Traditional systems of water management in Maharashtra. In Chakravarty, K.K.; Badam, G.L. and Paranjpye, V. (Eds), Traditional Water 
२८ ) Management Systems of India, pp. 3–7. Indira Gandhi Rashtriya Manav Sanghrahalay, Aryan Books International. Bhopal, New Delhi.
२९ ) Mandake, G. (Ed). 2003. Man͂car yethīl ī.sa. 1344 madhīl shilalekha. In Shodha nibandha saṇgraha. Akhila Mahārāṣṭra Ithihās Pariṣad. Adhives̍an Akrāve. 2002-03. Chāndvaḍa.
३० ) Marathe, M. 2019. Reimagining water infrastructure in its cultural specificity. Case of Pune. 
३१ ) Technical University Darmstadt. urn:nbn:de:tuda-tuprints-92810
३२ ) Marathe, M. 2021. Baravas: An architectural exploration of the traditional groundwater storage structures of Pune, India. Ancient Asia. 12:1, pp. 1-1. DOI
३३ ) Pāṭhaka, A. 2017. Mahārāṣṭrātīl bārava sthāpatya āni pāramparik jalvyavasthāpan. Aparānt. Pụne.
३४ ) Raut, D. 2022. Photograph and video of barav at Manchar.
३५ )  https://punyachepaani.livingwatersmuseum.org/story/baravs/
३६ ) https://www.chaturthamiti.in/2022/07/blog-post.html
३७ ) discovermh.com
३८ ) https://www.indianstepwells.com/2020/02/maharashtra-stepwells.html
३९ ) https://historicano2.blogspot.com/2021/11/nevari-barav-bavadi.html?m=1
४० ) http://maharashtra-bhakti-shakti.blogspot.com/2019/08/blog-post.html
४१ ) dainikprabhat.com
४२ ) https://www.etvbharat.com/marathi/maharashtra/state/amravati/barva-well-in-amravatis-talegaon-dashasar-shows-rich-heritage-of-ancient-india/mh20230120124005879879397
४३ ) http://maharashtra-bhakti-shakti.blogspot.com/2019/12/blog-post.html
४४ ) mahad.grptechs.com
४५ ) https://www.facebook.com/groups/2976328375814407/user/100002150256055/
४६ ) indiantempless.in
 https://www.indiejournal.in/article/%E0%A4%AB%E0%A5%8B%E0%A4%9F%E0%A5%89%E0%A4%A8-:-%E0%A4%96%E0%A4%9C%E0%A4%BE%E0%A4%A8%E0%A4%BE-%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B9%E0%A5%80%E0%A4%B0
 
 
अप्रतिम नक्षीकामाने नटलेल्या बारवा देतात. त्यांचीच ही धावती ओळख !
      पाचीन काळात भारतात जलवास्तुकला ही पुढारलेली होती. ज्या संस्कृतीत माणुसकीचा, नात्यांचा ओलावा टिकून होता, त्या काळात जमिनीतील ओल ओळखण्याचं, शोधण्याचं आणि तो ओलावा जपून, सांभाळून ठेवण्याचं, आणि वापरण्याचं तंत्रही विकसित होतं. हे आजही असलेल्या प्राचीन जलास्रोतांवरून ध्यानात येतं. आजही या कौशल्याचे अवशेष ठिकठिकाणी विहिरी, बारवा, कुंड, आड यांच्यातून जाणवतात. बारवांची रेलचेल अनेक भागात पाहायला मिळते आहे. काही गावांत तर घरटी आड आणि चौका-चौकात बारवा असलेल्या पाहायला मिळतात. तर काही बारवांचा उपयोग राजेरजवाड्यांच्या काळात त्यांच्या पायऱ्यांमुळे रात्रीच्या वेळी अॅम्फी थिएटरसारखा केला जात होता. अशा बारवात दिवसा पाणी आणि रात्री गाणी बजावणी चालायची. यातील काही जुन्या बारवांची उपयोगिता काळाच्या ओघात संपली असली तरी या बारवा तत्कालीन सार्वजनिक जलव्यवस्थापनाचा दस्तावेज नक्कीच ठरू शकतील. या पुरातन आणि ऐतिहासिक बारवांमधून जलव्यवस्थापनाबरोबर प्राचीन भव्यदिव्य कलात्मक स्थापत्यशास्त्राचं दर्शन होतं. चांद बावडी, रानी की बाव अशा काही बारवा आता केवळ भारताच्या दृष्टीने महत्त्वाच्या राहिलेल्या नसून त्या जागतिक वारशात नोंदवल्या गेलेल्या आहेत. या प्राचीन जल वास्तुशास्त्राकडे आज दुर्लक्ष झाले असून हा पाणीदार वारसा आपण पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवायला हवा. अशाच काही जलस्रोतांची भटकंती नक्कीच आपल्या मनातील आनंदाचा ओलावा वाढवणारी ठरेल.

रानी की बाव
  राजाने राणीच्या प्रेमाचे प्रतीक म्हणून बांधलेला ताजमहाल आपल्याला माहिती आहे. मात्र भारतात एखाद्या राणीने आपल्या पतीप्रेमाचे प्रतीक म्हणून अजरामर अशी कलाकृतीही निर्माण केलेली पाहायला मिळते. एकीकडे पत्नीच्या प्रेमाचे प्रतीक असलेला ताजमहाल आकाशाला गवसणी घालू पाहतो. तर दुसरीकडे राणीने राजावरील प्रेमाचे प्रतीक म्हणून निर्माण केलेलं शिल्प पृथ्वीच्या गर्भातल्या ओलाव्यास स्पर्श करते आहे. गुजरातमधील पाटणजवळील 'रानी की बाव' म्हणजे प्रेमाचे अनोखे प्रतीक म्हणायला हवी. गुजरातमधील वडनगरचा राजा भीमदेव याची पत्नी उदयमती हिने पतीच्या स्मरणार्थ ही सात मजली विहीर बांधली. त्यामुळे हिला 'रानी की बाव' म्हणून ओळखलं जातं ६४ मीटर लांब, २० मीटर रुंद आणि २७ मीटर खोल अशा या विहिरीला अनेक पायऱ्या आहेत. राजा भीमदेव याच्या स्मरणार्थ त्याची राणी उदयमती हिने १०२२ ते १०६३ या काळात बांधलेली ही सात मजली विहीर वास्तुकलेचा उत्तम नमुना आहे. त्याकाळी भूमिगत पाण्याचा करण्यात आलेला उपयोग हे या विहिरीचे खास वैशिष्ट्य आहे. ही सात मजली दगडी विहीर हा जल वास्तुकलेचा एक उत्कृष्ट नमुना तर आहेच, पण जलव्यवस्थापनाच्या दृष्टीने अभ्यासनीय आहे. या राणीच्या बावमध्ये सरस्वती नदीचं पाणी येतं असं मानलं जातं. विहिरीच्या प्रत्येक मजल्यावर राम, वामन, महिषासुरमर्दिनी, कल्की अशी उत्कृष्ट शिल्पं कोरली गेली आहेत. 'राणीच्या बाव'च्या सात मजल्यांपैकी पाच मजले आज जतन करण्यात आले आहेत.
या विहिरीत एक दार आहे आणि त्यातून भुयार होते. भुयार आता बंद केलं असलं तरी त्या काळी शत्रुचा हल्ला झालाच तर या भुयारातून बाहेर पडण्यासाठी आपत्कालीन मार्ग होता असं सांगितलं जातं. भीमदेव राजाच्या प्रेमाचे प्रतीक असलेली, त्याच्या पत्नीने उदयमतीने बांधलेली 'रानी की बाव' एकदा पाहून हा जलठेवा मनात साठवायला हवा. 'युनेस्को'ने जागतिक वारसा स्थळात या राणीच्या बावची नोंद केली आहे.

चाँद बावडी
जयपूर-आग्रा महामार्गावर दौसा जिल्ह्यात अभानेरी या गावातील चाँद बावडी ही भारतीय जल वास्तुशास्त्राचा अद्भुत नमुना म्हणावी लागेल. दौसा या जिल्हा मुख्यालयापासून ३५ किलोमीटर अंतरावर ही जगप्रसिद्ध विहीर पाहायला मिळते. नवव्या शतकात राजा मिहिर भोज जे चाँद नावाने ओळखले जात होते, त्यांनी ही विहीर निर्माण केली. त्यांच्या नावावरून या विहिरीचे नामकरण 'चाँद बावडी' असे झाले. जगातील सर्वात खोल आणि मोठी विहीर म्हणून या 'चाँद बावडी'ची ख्याती जगात आहे. ३५ मीटर रुंद असलेल्या या विहिरीला तब्बल तेरा मजले आहेत. १०० फुटांहून अधिक खोल असलेल्या या बावडीला पस्तीस हजार पायऱ्या आहेत. ही विहीर भुताखेतांनी बांधलेली असून एकदा एखादी वस्तु या विहिरीत पडली तर ती सापडणे अशक्य आहे अशा या विहिरीच्या अनेक दंतकथा या भागात प्रसिद्ध आहेत. बावडीमध्ये उतरलेली व्यक्ती पुन्हा त्या पायरीवरुन वर येऊ शकत नाही. त्यामुळे त्याला भूलभुलय्या झाल्याशिवाय राहत नाही. पौर्णिमेच्या रात्री ही 'चाँद
बावडी' पांढरी शुभ्र दिसते म्हणून चांदण्या रातीला हिचे सौंदर्य पाहण्यातील मजा काही वेगळीच आहे. तेहतीस कोटी देवतांच्या मूर्ती या बावडीच्या खांबावर कोरलेल्या आहेत. बावडीच्या समोर प्रसिद्ध हर्षद माता मंदिर आहे. जगातील सर्वात मोठी आणि खोल विहीर असलेल्या या चाँद बावडीस आवर्जून भेट देऊन प्राचीन स्थापत्यकलेचा वारसा स्थळास भेट देणं गरजेचं आहे.

विहीर :-

    विहिरींची व्यवस्था : प्राचीन काळापासून लोक विहिरींची पाणीपुरवठ्याचे साधन म्हणून विहिरीचा वापर करीत होते. संव्हा शत्रू संरक्षणासाठी किंवा राज्याच्या रक्षणासाठी गिरिदुर्गाचा वापर ऊ लागला तेव्हाही दुर्गातील लोकांना पाणीपुरवठ्यासाठी विहिरींची करज भासू लागली. तेव्हा विहीर कशास म्हणतात याचा जेव्हा विचार करू लागतो तेव्हा भावप्रकाशकार विहिरीचे लक्षण किंवा व्याख्या सांगताना लिहितात की, अल्पविस्तार असलेली भूमी खोल आणि गोलाकार खणलेली, बांधलेली किंवा न बांधलेली ती विहीर होय. मराठी विश्वकोशात 'पावसाचे पाणी जमिनीच्या सच्छिद्र स्तरातून झिरपल्यावर अभेद्य खडकातून किंवा चिकण मातीतून पुढे जाण्यास मार्ग र मिळाल्यामुळे साचून राहते, अशा जलसंचातील पाणी काढण्यासाठी खोदलेल्या खड्ड्यास पाण्याची विहीर म्हणतात,' अशी विहिरीची दुसरी याख्या केलेली आहे.

विहिरींचे प्राचीन उल्लेख

ज्या भागात मानव पाण्यापासून वंचित होता, पाण्यापासून त्याला लांब राहावे लागत होते, तेथे विहिरी खोदण्याची प्रथा सुरू झाली. याला गिरिदुर्ग अपवाद असण्याचे कारण नव्हते. कारण हिंदुस्थानात विहिरी खोदण्याची प्रथा प्राचीन काळापासून आहे. ज्या प्राचीन संस्कृतीपासून हिंदुस्थानच्या इतिहासाचा प्रारंभ होतो, त्या सिंधू संस्कृतीमधील लोकांच्या घरोघर आणि घराबाहेर चव्हाट्यावर विहिरी होत्या. त्यातील काही गोलाकार आणि काही अंडाकार होत्या. त्या चारही बाजूंनी बांधलेल्या होत्या. काही विहिरींना पायऱ्या असून, काही वरून बंद केलेल्या आढळल्या. पुरातत्त्व अभ्यासकांच्या मते या विहिरीवर रहाट बसविलेले असावे. याचा अर्थ हडप्पा काळात वास्तुशास्त्र खूपच प्रगत झाले होते.
ऋग्वेदात  अनेक ठिकाणी विहिरींचे उल्लेख आढळतात. वैदिक आर्य कण्वाचा उपयोग पिण्यासाठी तर करीत होतेच पण शेतीसाठीही ते त्याचा वापर करीत असावेत. विहिरीतून रहाटगाड्याने किंवा दगडी चाक बसवून पाणी काढीत असत. या दगडी चाकावर वादी बसवून त्या वादीला लाकडी पोहरा बांधून त्याद्वारे पाणी काढीत असत.
जातक कथांमधून विहिरींचे आणि विहीर खणण्याचे उल्लेख येतात. बोधीसत्त्वाने अशीच एक विहीर खोदून खुणेसाठी तिथे ध्वज लावल्याचा उल्लेख वेणुपथ जातकात आढळतो. विनयपिटकात विहीर कशी निर्माण करावी याची माहिती दिली आहे.

जलाचे महत्त्व
   याज्ञवल्क्य स्मृतीत स्पष्ट म्हटलेले आहे की, 'जलाशय निर्मितीने पुण्य प्राप्त होते. तसेच जलाशयाचा विध्वंस केला तर भ्रूणहत्येचे किंवा मनुष्यवधाचे पाप लागते.' जलसंचयाचा विनाश करणाऱ्या गुन्हेगाराला तो तरंगू शकणार नाही, एवढा मोठा दगड गळ्यात बांधून त्याला जलसमाध देणे हेच उचित शासन होय, असे धर्मशास्त्रकार मानतात. पुढे ते असेह

षटकोनी, अष्टकोनी किंवा स्वस्तिक आकाराच्याही विहिरी आपणास आढळतात. अशा विविध आकाराच्या विहिरी गारव्यासाठी, जप-जाप्य करण्यासाठी, संपत्ती लपवून ठेवण्यासाठी किंवा गुप्त मानि दुर्गातून बाहेर पडण्यासाठी बांधलेल्या असत. काही वेळा शत्रूला विहीर दिसू नये म्हणून विहिरीवर एखादी छत्री किंवा घुमट बांधून ठेवीत व त्या घुमटाखाली विहीर असे. नाना फडणविसाने सदाशिव पेठेच्या हौदात ज्या विहिरीतून पाणी आणले आहे ती पुण्यातील विहीर घुमट बांधून आच्छादून टाकली आहे. वेरूळच्या घृष्णेश्वर मंदिराजवळ कलाकृतीपूर्ण तीर्थविहीर आहे किंवा सातारा ते भुईंज या रस्त्यावर 'शेरी निंब' येथील अष्टकोनी विहीर ही अशीच सुंदर आहे.

दुर्गातील विहिरीवरील रहाट व मोटा
 दुर्गात जलपुरवठ्यासाठी विहीर, बारव, आड इ. असत. त्यातून पाणी काढण्यासाठी रहाटाची किंवा दगडी चाकाची योजना केलेली असे. रहाटाला दोर बांधलेला असे. हा दोर तागापासून बनविलेला असे. सोनगीरच्या विहिरीतून पाणी काढण्यासाठी अंबाडीचा वापर होत असे. सोनगीरच्या इ.स. १८०६-०७ च्या ताळेबंदात अंबाडीवर साडेतीन रुपये खर्च झाल्याची नोंद आहे. पेडगावच्या किल्ल्यात भीमा नदीचे पाणी किल्ल्याच्या आत घेतले आहे. पण नदीचे पात्र खोल असल्याने व किल्ला उंच जागी असल्याने रहाटेच्या सहाय्याने पाणी वर ओढून ते किल्ल्यात उंच जागी बांधलेल्या हौदात प्रथम टाकले जाई. नंतर खापरीच्या नळाद्वारे ते किल्ल्यातील इतर भागात पोचविले जाई. या किल्ल्यात नंतरच्या काळात औरंगजेबाने आपली कन्या व पत्नीस वास्तव्यास ठेवले होते. नेमके याच वेळी मराठे औरंगजेबावर सतत हल्ले करीत होते. या हल्ल्यातून आपल्या कुटुंबाचे रक्षण व्हावे म्हणून औरंगजेबाला पेडगावच्या किल्ल्यात मोठे सैन्य ठेवावे लागे. लष्कराची संख्या वाढल्याने किल्ल्याला अधिक प्रमाणात पाण्याची गरज भासू लागली, म्हणून औरंगजेबाने पूर्वीच्या हौदाजवळ आणखी एक हौद बांधला. त्यात मोटेच्या सहाय्याने पाणी ओढून ते या उंच हौदात टाकून किल्ल्याच्या लांबच्या प्रदेशात की, जेथे शाही कुटुंबाचे वास्तव्य असे तेथे पाणी पुरविण्यात येऊ लागले. ही मोट चामड्यापासून बनविलेली असे व ती ओढण्यासाठी हत्तीचा वापर केला जात असे. म्हणून ज्या हौदात पाणी पडे तिला 'हत्ती मोट' असे म्हणत. अनेक ठिकाणी पाणी काढण्यासाठी मोटेला बैल जुंपत असत. पाणिनीच्या अष्टाध्यायित तसा उल्लेख आहे. अनेक ठिकाणी रहाटाला लोखंडी बादली, घागर किंवा डबा लावून माणसे स्वतःच्या हाताने पाणी काढीत असत. प्राचीन काळी विहिरीतून पाणी काढण्यासाठी लाकडाचा पोहरा वापरीत असत. विहिरीतून पाणी काढण्यासाठी जे साहित्य लागत असे, उदा. दोर, घागर इ. तर प्राचीन काळापासून या साहित्याची चोरीही होत असे, असे मनुस्मृतीवरून वाटते. कारण मनू म्हणतो की, विहिरीवरील दोर, घागर जर चोराने चोरले तर ते सामान चोराकडून भरून घ्यावे आणि राजाने त्याला एक मासा सोने दंड करावा. यावरून विहिरीवरील या साहित्याची चोरी होत होती हे स्पष्ट होते.

काही दुर्गावरील विहिरी
 काही किल्ल्यांत आपणास एकापेक्षा अधिक विहिरी खोदलेल्या आढळतात. मराठवाड्यातील परांडा या भुईकोट किल्ल्यात एकूण पाच विहिरी खोदलेल्या आढळतात. त्यांपैकी एक मुख्य विहीर असून, ती जलमहाल आणि राजवाडा यांच्या दरम्यान आहे. देवगिरी ऊर्फ दौलताबाद किल्ल्यात मोती टाका आणि हत्ती टाका या दोन टाक्यांत पावसाचे पडणारे पाणी गोळा करून त्याचा वर्षभर उपयोग करीत. किल्ल्यात कडा बावडी, शक्कर बावडी आणि सरस्वती अशा तीन विहिरी होत्या. असे सांगतात की, यादवकाळात देवगिरी आणि कटक भागात लोकांना पाण्याचा पुरवठा व्हावा म्हणून सुमारे शंभर विहिरी खोदलेल्या होत्या. याशिवाय अनेक तलाव आणि खडकात खोदलेली टाकी यातूनही जलपुरवठा होत असे.
  मुरूडचा जंजिरा किल्ला हा पूर्णतः समुद्रात उभा आहे. समुद्रातील एका खडकावर त्याची उभारणी केलेली आहे. त्यामुळे याच्या चारही बाजूंनी समुद्राचे पाणी आहे. हा दुर्ग अजिंक्य दुर्ग म्हणून ओळखला जातो. छत्रपती शिवाजी महाराजांनी एकूण सात वेळा हा दुर्ग जिंकण्याचा प्रयत्न केला. पण त्यांच्या यशाला या दुर्गाने सतत हुलकावणी देऊन हा इ.स. १९४७ पर्यंत परकीय सत्ता सिद्दीच्या ताब्यात होता. जेव्हा या दुर्गाची उभारणी झाली, तेव्हा या दुर्गातील तट व इमारतीच्या उभारणीसाठी दुर्गातील दगड काढून तेथे जलाशये निर्माण केले. त्या जलाशयांत पावसाचे पडणारे पाणी साठवून ठेवण्यात येऊ लागले. पण या दुर्गात असलेल्या लहानशा विहिरीकडे 'एक चमत्कार' म्हणून पाहिले जाते. चारही बाजूंना समुद्र असलेल्या दुर्गात लहान व गोलाकार विहीर खोदलेली आहे, तिचे पाणी अतिशय गोड असून, ते पिण्यास योग्य आहे.

सोनगीरच्या किल्ल्यातील विहीर

धुळे जिल्ह्यात सोनगीर गिरिदुर्ग आहे. खानदेशात फारुकी घराण्याचा संस्थापक राजा अलीखान याने हा दुर्ग जिंकून घेतल्याचा उल्लेख 'फरिश्ता' या ग्रंथात आलेला आहे. यावरून हा दुर्ग यादवपूर्वकालीन असल्याचे स्पष्ट दिसते. तसेच या दुर्गातील इ.स. १५७५ मधील शिलालेखावरून हा दुर्ग यादवपूर्वकालीन असल्याचे स्पष्ट होते.
   सोनगीरच्या सपाट माथ्यावर दुर्गाला जलपुरवठा व्हावा म्हणून एक विहीर खोदली आहे. तिचा आकार चौकोनी आहे व आजही विहीर सुस्थितीत आहे. या विहिरीतून दुर्गाला पाणीपुरवठा केला जात असे. तसे पाहिले तर हा दुर्ग फार मोठा नाही. फार तर या दुर्गावर शंभरएक माणसे राहू शकतील. तेव्हा किल्ल्याच्या संरक्षणासाठी दुर्गाभोवती वस्ती असणे आवश्यक होते. या हेतूने दुर्गाच्या पायथ्याशी सोनगीर नावाचे गाव वसलेले आहे. किल्ल्याच्या समोरच्या बाजूला गावाच्या रक्षणासाठी खंदकाची योजना केली होती. त्याचबरोबर गावातील रयतेला पाणी मिळावे म्हणून किल्ल्यातील विहिरीचे पाणी खापरी पाइपाद्वारे गावात आणले आहे. विहिरीतील पाणी मोटेद्वारे काढून किल्ल्याच्या समोर चुन्याने बांधलेल्या हौदात आणले जाई. त्यासाठी अंबाडीच्या दोराचा वापर करीत. इ.स. १८०६-०७ च्या पेशवे दफ्तरातील ताळेबंदातील
 अंबाडीवर साडेतीन रुपये खर्च झाल्याची नोंद आहे. आजही या खापरी पाइपांचे अवशेष तेथे आढळतात. अतएव दुर्गातील विहीर ही सोनगीर गावाला लाभलेली दैवी देणगी होती असे म्हटल्यास वावगे ठरू नये. कंधार, परांडा, देवगिरी आदी किल्ल्यांत पाणी वाहून नेण्यासाठी खापरांचा वापर केलेला आढळतो.

अंधारबाव विहीर, नव्हे ! तीनमजली महालच
   पन्हाळ्याच्या दुर्गात एक आगळीवेगळी विहीर आपणास दिसते. सदर विहीर इतर विहिरींच्या तुलनेत खूपच भिन्न आहे. या विहिरीतून नेहमीप्रमाणे जलाची प्राप्ती तर होतेच, पण हिचा वापर निवासासाठी करून घेण्याची कल्पकता येथे दाखविली आहे. मधला भाग हा चोरवाट
 का किंवा भुयारी मार्ग म्हणून वापरण्याची केलेली या विहिरीतली व्यवस्थाही अपूर्व आहे. अशी व्यवस्था महाराष्ट्रातील कोणत्याच दुर्गातील विहिरीत आपणास दिसून येत नाही. अंधारबाव या नावाने ओळखल्या जाणाऱ्या या विहिरीचा उल्लेख श्रीनगर किंवा शृंगारबाव असाही केलेला आढळतो. ही विहीर तीनमजली आहे. सर्वांत वरच्या मजल्यावर राहण्याची सोय आहे. ही बाव नुसती विहीर नसून जणू तीनमजली महालच आहे. सुंदर स्वच्छ पाण्याचा झरा, राहण्याची जागा व किल्ल्यातून बाहेर पडण्याचा चोरमार्ग अशा तीन गोष्टी अंधारबावमध्ये एकत्र करण्यात आल्या आहेत.
   अंधारबाव इ.स. १४८९ साली विजापूरचा सुलतान आदिलशाह याच्या कारकीर्दीत बांधण्यात आली व ती अबू युसूफ या कामगाराच्या नेतृत्वाखाली पूर्ण करण्यात आली, असा शिलालेख या अंधारबावेवर कोरलेला आहे. वर सांगितल्याप्रमाणे काही दुर्गावर एकापेक्षा अधिक विहिरी असत त्यांपैकी पन्हाळा दुर्ग होय. यात वर सांगितल्याप्रमाणे अंधारबाव ही विहीर तर होतीच पण 'कर्पूरबाव' नावाची आणखी एक - विहीर होती. जिचा उल्लेख जयराम पिंडे आपल्या 'पर्णालपर्वतग्रहाणाख्यान' नावाच्या ग्रंथात करतो. शिवाजी महाराज या विहिरीजवळ काही काळ थांबले आणि त्यांनी पाण्याला स्पर्श केला असल्याचा उल्लेख त्या ग्रंथात आल्याने छत्रपती शिवाजी महाराजांनी कदाचित या विहिरीचे पाणी प्राशन केले असावे असे वाटते.
   तोफेपासून बचावासाठी विहिरीचा वापर दुर्गात जलाचा पुरवठा व्हावा म्हणून विहिरीचा वापर केला जात असे. पण नळदुर्ग किल्ल्यात असलेल्या एकमेव विहिरीचा वापर पाणीपुरवठ्यासाठी होत नसून तिचा वापर तोफेपासून बचाव करण्यासाठी होत असे. तसे पाहिले तर नळदुर्ग किल्ल्यात पाण्याच्या पुरवठ्यासाठी विहीर खोदलेली नाही, तर जी एकमेव विहीर दुर्गात आहे ती टेहळणी बुरुजाजवळ आहे. या विहिरीचा वापर जलव्यवस्थापनेसाठी केला जात नव्हता. जेव्हा तोफेला बत्ती दिली जात असे, तेव्हा बत्ती देणारी व्यक्ती तोफेला बत्ती देऊन दोराच्या सहाय्याने या विहिरीतील पाण्याचा आश्रय घेत असे. त्यामुळे होणाऱ्या आवाजाचा त्याच्या कानावर परिणाम होत नसे.

विहिरींची विविध नावे
   दुर्गातील विहिरींना विविध नावे दिलेली आढळतात. माहूरच्या गिरिदुर्गात असलेली बारव ही 'कटोरा बावडी' या नावाने ओळखली जाते. तिला गौतम झरा असेही म्हणतात. कटोरा बावडीवर रायगड किल्ल्याचा किल्लेदार पुरांचान्द्र याने इ. स. १७७७ मध्ये कटोरा बावडीचा जीर्णोद्धार केल्याचा शिलालेख आहे.
पन्हाळा दुर्गावर दोन विहिरी होत्या, त्या 'कर्पूरबाव आणि अंधारबावडी' या नावाने ओळखल्या जात. देवगिरी किल्ल्यात काही विहिरी होत्या त्या 'कडाबावडी, शक्करबावडी आणि सरस्वती विहीर' या नावाने ओळखल्या जात. सरस्वती विहिरीला ३० पायऱ्या आहेत. तिचा

परांडा किल्ल्यातील विहीर ३३ चौ. मी. असून, तिची खोली साधारणपणे १४ मीटर आहे. या हिरीच्या एका कमानीत गणेश व भ. महावीर यांच्या मूर्ती आहेत. या हिरींच्या कमानीचे बांधकाम विटांनी केलेले आहे. उदगीरच्या भुईकोट *त्त्यात उदगीर बाबांच्या समाधीसमोर एक विहीर आहे. ही विहीर त्यंत खोल असल्याने तसेच तटबंदीच्या बाजूला असल्याने तिच्यात गंधार पडत असे. अतएव ही विहीर अंधार बावडी या नावाने ओळखली ते. ही व तीनमजली आहे.
औसाच्या भुईकोट किल्ल्यातील खंदकात तीन विहिरी आहेत. ज्या हिरीवर लोखंडी तवा झाकला आहे, ती 'तवा विहीर'. ज्या बारवेचा कार चंद्रासारखा आहे ती चांद बावडी आणि तिसरी विहीर कटोरा वडी या नावाने ओळखली जाते. औसा किल्ल्यात अंधेरी विहीर या रावाने ओळखली जाणारी आणखी एक विहीर आहे. परांडा किल्ल्याच्या बंदकात खंदकाला पाणीपुरवठा व्हावा म्हणून दोन विहिरी खोदल्या आहेत. त्यांपैकी दक्षिण दिशेला असणारी विहीर ही 'चांभार विहीर' या नावाने ओळखली जाते.
अहमदनगर भुईकोट किल्ल्यात चार विहिरी आढळतात. गंगा, जमुना, मच्छलीबाई व शक्करबाई अशी या विहिरींची नावे होती. मच्छलीबाई ही विहीर चांदबिवीच्या काळात खोदली असल्याचे सांगितले जाते. या चार विहिरींपैकी दोन विहिरींची नावे मुसलमान राजवटीत पवित्र हिंदू नद्यांची असावीत हे विशेष. ही हिंदू नावे ठेवण्यामागील कारण कळत नाही.

शिवछत्रपती निर्मित सिंधुदुर्ग या जलदुर्गामध्ये तीन विहिरी आहेत. त्यांची नावे दूधबाव, साखरबाव आणि दहीबाव अशी आहेत.

विसापूरच्या किल्ल्यात विहीर खोदण्यास पेशव्यांची आज्ञा (१७५४-५५)

बाळाजी बाजीराव पेशव्याने विसापूरचा किल्लेदार शिवाजी कृष्ण याला इ.स. १७५४-५५ मध्ये एक आज्ञापत्र पाठवून त्यात कळविले आहे की, विसापूर येथे एक नवीन विहीर खोदणे. ही विहीर खोदण्यासाठी बाळाजी बाजीराव यांनी दरबारातून दोन हजार रुपये खर्च करण्यास मान्यता दिली आहे. त्यांनी शिवाजी कृष्ण या किल्लेदाराला जी सनद पाठविली आहे त्यात त्यांनी म्हटले की, विहीर खोदताना तिला खाली पाणी रोखण्यासाठी किंवा विहिरीत पाणी सोडण्यासाठी एक जलनियंत्रक दरवाजा ठेवावा म्हणजे ज्या वेळी विहीर आटेल त्या वेळी शेजारच्या तळ्यातून विहिरीत पाणी सोडता येईल. विहिरीबरोबरच या किल्ल्यावर पाण्याची तळीही तयार करण्याची आज्ञा पेशव्यांनी विसापूरच्या किल्लेदाराला दिली आहे. जलाच्या बाबतीत काही किल्ले भाग्यवान असल्याचे दिसून येते. यापैकी लोहगड हा किल्ला दिसतो. या किल्ल्याच्या माचीवर त्रिंबक जोशी यांच्या परसात एक विहीर होती. 'तिजला पाणी बहुत आहे' असा या विहिरीचा पेशवे दफ्तरात उल्लेख आढळतो.

दुर्गातील विहिरींची दुरुस्ती

दुर्गातील विहिरी अनेकदा नादुरुस्त होत. विहिरींच्या भिंती ढासळत किंवा अनेकदा त्यात गाळ साठत असे. तेव्हा त्या दुरुस्त करण्याची प्रथा मध्ययुगात आपणास आढळते. सोलापूर येथे भुईकोट प्रकारचा किल्ला आहे. या किल्ल्यात स्वस्तिकाकाराची एक विहीर आहे. ती नागबावडी या नावाने ओळखली जाते. या विहिरीत उतरण्यासाठी तिन्ही बाजूंनी पायऱ्या आहेत. औरंगजेबाच्या काळात या विहिरीची पडझड होऊन तीत मोठ्या प्रमाणात गाळ साचला होता. ही बाब औरंगजेबाला कळताच १३ फेब्रुवारी १६९६ रोजी सकाळी औरंगजेबाने बागांचा दरोगा ख्वाजा याकूब याला बोलविले आणि त्याला आज्ञा दिली की, महालातून एक हजार रुपये घेऊन जा आणि सोलापूर किल्ल्यातील विहीर दुरुस्त करा. तिच्यात साचलेला गाळ बाहेर काढा. या आज्ञेनुसार ख्वाजा याकूब याने कहारांचा दरोगा दुलालाला, बेलदारांचा दरोगा हिराचंद, कचेरीचा दरोगा हाजी सुहराव आदींना बरोबर घेतले आणि तो सोलापूरच्या विहिरीचा गाळ काढण्यासाठी सोलापूरकडे रवाना झाला.
औरंगजेबाच्या या आज्ञेवरून आपणास असे स्पष्ट होते की, जल हा दुर्गांचा प्राण असतो आणि हा प्राण विहिरीत गुंतलेला असतो. तेव्हा त्याची काळजी घेणे अत्यंत आवश्यक असते याची जाणीव औरंगजेबाला होती. म्हणून त्याने त्वरेने ख्वाजा याकूब याला विहिरींच्या दुरुस्तीसाठी सोलापूर येथे पाठविले.

गुप्त मार्ग म्हणून विहिरींचा उपयोग

दुर्गातील विहिरी या प्रामुख्याने जलपुरवठ्यासाठी असत; परंतु काही दुर्गात जलपुरवठ्याबरोबरच या विहिरींची रचना अशी केलेली असे की, ज्या वेळी दुर्गावर शत्रूचे आक्रमण होत असे, त्या वेळी या विहिरींचा वापर चोरमार्ग म्हणून केला जात असे. अर्थात विहिरी बांधतानाच या विहिरीत असे चोरमार्ग बांधून ठेवलेले असत. कित्येकदा दुर्गाला शत्रूचा कित्येक महिने वेढा पडे. त्या वेळी दुर्गातील अन्नधान्य संपत आलेले असे किंवा शत्रुपक्ष किल्ल्याला खिंडार पाडण्यात यशस्वी ठरे, काही वेळा किल्ल्यातील राजघराण्यातील व्यक्ती किंवा अधिकाऱ्यांना दुर्गांतून निसटणे आवश्यक असे. तेव्हा विहिरीतील चोरमार्गाचा उपयोग करून किल्ल्यातील महत्त्वाच्या व्यक्ती दुर्गातून बाहेर पडत. परांडा किल्ल्यातील बारवेजवळ असा चोरमार्ग होता. शत्रूच्या हल्ल्याच्या वेळी
   या चोरमार्गाचा वापर केला जात होता. पन्हाळा किल्ल्यातील अंधारबाव ही अशीच एक विहीर आहे. या विहिरीच्या मध्यभागात चोरवाट किंवा भुयारी मार्ग आहे. संकटप्रसंगी या चोरवाटेचा उपयोग करण्याची कल्पना खरोखरीच आश्चर्यकारक वाटते.

दुर्गातील जलमहालांसाठी विहिरींचा उपयोग

दुर्गातील विहिरींच्या जलाचा वापर पिण्यासाठी, शेतीसाठी आणि खंदकासाठी जसा केला जात असे तसेच दुर्गातील काही इमारती गारवा राहावा म्हणूनही केला जात असे. याचे सर्वांत सुंदर उदाहरण म्हणजे नळदुर्ग येथील जलमहालाचे होय. बोरी नदीचे पाणी अडवून नळदुर्गातील जलमहाल हा वातानुकूलित केला आहे. याशिवाय आणखी एक उपयोग तत्कालीन शासनकर्त्यांनी करून घेतला. पडणाऱ्या पाण्यातून निर्माण होणारी ऊर्जा त्यांनी पवनचक्कीसाठी वापरली. या पवनचक्कीच्या सहाय्याने धान्य दळण्याची चक्की चालवता येत होती. या किल्ल्यातून पडणाऱ्या पावसाचा उपयोग सौंदर्यदृष्टी वाढविण्यासाठी तर तत्कालीन राज्यकर्त्यांनी करून घेतलाच पण त्याबरोबर या पाण्याच्या प्रवाहाचा उपयोग त्यांनी घरगुती जीवनासाठीही करून घेतला. प्रवाहाच्या सहाय्याने लष्कराला लागणारे धान्य दळून घेण्याचे कार्य त्यांनी या प्रवाहाद्वारे करून घेतले, हे विशेष होय. म्हणून मध्ययुगात जे किल्ले निर्माण झाले त्या किल्ल्यांमध्ये नळदुर्गाचा किल्ला हा वैशिष्ट्यपूर्ण मानला जातो. या पाणी महालाची निर्मिती दुसऱ्या आदिलशहाच्या काळात मीर इमादिन या वास्तूशास्त्रज्ञाच्या आराखड्याच्या सहाय्याने इ.स. १५५८ मध्ये झाली.
अशीच व्यवस्था आपणास औसा किल्ल्यात दिसते. औसा किल्ल्यातील ही सर्वांत प्रेक्षणीय इमारत मानली जाते. तिला किल्ल्यातील तळघर किंवा पाणी महाल असे म्हटले जाते. या इमारतीचे वैशिष्ट्य म्हणजे या इमारतीचा कोणताही भाग हा जमिनीवर दिसत नाही. ही इमारत पूर्णपणे जमिनीच्या आत बांधली आहे. या इमारतीत प्रवेश करण्यासाठी पश्चिम बाजूने जिना आहे. त्याला बारा पायऱ्या आहेत. त्या उतरून गेल्यानंतर आत एक प्रचंड तळघर आहे. प्रारंभी जिना उतरून गेल्यानंतर ते दिसत नाही. कारण तेथे पूर्णपणे अंधार असतो. पायऱ्या उतरून आल्यानंतर आपणास एक लांब चौथरा लागतो. या चौथऱ्यावर गेल्यानंतर तळघरात उतरण्यासाठी एक जिना आहे. असे सांगतात की, या तळघरातून बाहेर जाण्यासाठी एक गुप्तमार्ग आहे. या गुप्तमार्गाने संकटप्रसंगी किल्ल्याच्या बाहेर पडता येत असे. ही इमारत पाणी महाल या नावाने ओळखली जात असे. या इमारतीच्या वर एक पाण्याचा हौद आहे. त्याला वीस झरोके आहेत. या हौदात जिन्यावर लोखंडी प्लेट्स ठेवून पाणी भरले जात असे. त्यामुळे प्रारंभी हा पाण्याचा हौद आहे असे वाटते. पण आत दोन-तीन माणसे काही तासच सहज राहतील अशी व्यवस्था आहे. त्यामुळे आत माणसे आहेत याची पुसटशीही कल्पना शत्रूला येत नसे. या इमारतीवरील हौदात तवे विहिरीतील पाणी सोडले जात होते. ते तळघर ७६ x ५० फूट एवढे आहे. याचा अर्थ दुर्गातील विहिरींचा उपयोग पाणी महालासाठी त्या काळी केला जात असे. औसा  किल्ल्यातील पाणी महालाजवळ दारूचे कोठार आहे. या कोठारालाही या पाणी महालाचा गारवा मिळून दारू कोठाराचे स्फोटापासून रक्षण होत असे. अशी दुहेरी गारव्याची व्यवस्था औसा किल्ल्यात तेथे असणाऱ्या विहिरींच्या सहाय्याने केलेली आढळते.

विहिरीवरील साहित्य चोरण्यासाठी केलेली शिक्षेची तरतूद
    प्राचीन काळापासून हिंदुस्थानात विहीर खोदणे पुण्यकारक मानले जाई. त्यामुळे त्या विहिरींचे रक्षण करणे सामाजिक कर्तव्याचा एक भाग मानला जाई. विहीर बुजविणे पापकारक मानले जाई. प्रायश्चित्त व्यवहार। विहीर तोडणाऱ्या व्यक्तीला दंड करावा, असे म्हटले आहे. परंतु या विहिरीमुळे मानवी जीवनाला अपाय होत असेल अशा विहिरी बुर्जावल्याची काही उदाहरणे आपणास साहित्यात आढळतात. उदा. भरताने चित्रकूटावर राम भेटीला जाताना अनेक कूप कारागिरांना बरोबर घेतले होते. जाताना त्याने मार्गात विहिरी खोदल्या व मार्गात आड येणाऱ्या विहिरी बुजवून टाकल्याचा उल्लेख वाल्मीकी रामायणात येतो. विहिरीत अनेकदा बाहेरील वस्तू पडत. त्या काढल्या जात असल्याचे उल्लेख आपणास महाभारतात आढळतात. कौरव-पांडव विटी-दांडूचा खेळ खेळत असताना त्यांची विटी विहिरीत पडली, तेव्हा कौरव व पांडवांचे गुरू द्रोणाचार्य यांनी ती विहिरीतून काढून दिल्याचा उल्लेख महाभारतात आढळतो. विहिरीवर पाणी काढण्यासाठी दोर, पोहरा, घागर यांसारखे साहित्य असे, पूर्वी उल्लेख केल्याप्रमाणे क्वचितप्रसंगी या साहित्याची चोरी होत असे. अशी चोरी होऊ नये व चोरी करणाऱ्या चोरांवर वचक बसवा म्हणून मनुस्मृतीत मनू म्हणतो की, विहिरीवरील दोर व घागर एखाद्याने चोरली तर चोराकडून ते सामान भरून घ्यावे आणि राजाने त्याला एक मासा सोने दंड करावा. यावरून आपणास असे दिसते की, मध्ययुगात विहिरीवरील साहित्याची चोरी करणारे काही चोर असावेत. त्याचबरोबर या चोरांना केवळ आर्थिक दंड करून त्यांची सुटका होत असावी. आजच्याप्रमाणे त्यांना चोरी केल्याबद्दल तुरुंगात पाठविले जात नसावे.

कौटिल्याच्या विहिरीबाबत शाश्वत सूचना

कौटिल्याने आपल्या अर्थशास्त्र या ग्रंथात विहिरीबाबत शाश्वत सूचना केल्या आहेत की, ज्या आजही उपयुक्त आहेत. कौटिल्य लिहितो की, जिथे मातीचा गोळा लागणार नाही अशा ठिकाणी चौकोनी विहीर खोदावी. तिचा ताल सर्व बाजूंनी बांधून काढावा. तिला भुईसपाट लाकडी दार असावे. तिच्यात तीन मजले व अनेक कोठड्या असाव्यात. विहिरीवर भाजीपाला लावावा व जे लोक लागवडीसाठी विहिरीचे पाणी वापरतील अशा लोकांकडून पाणीपट्टी म्हणून एकचतुर्थांश रक्कम वसूल करावी. तळी, विहीर किंवा जेथून जलपुरवठा होतो अशा स्थानाजवळ मलोत्सर्ग करणाऱ्या लोकांना दंड करावा. ज्या मार्गाने शत्रू येणार त्या मार्गावर आड किंवा गुप्त विहिरी मुद्दाम खोदून ठेवाव्यात म्हणजे येणारा शत्रू फसून त्याचा विहिरीद्वारे नाश होऊन आपला विजय होईल. यावरून आपणास असे दिसते की, कौटिल्य हा अनेक मजली विहिरींचा पुरस्कर्ता होता. त्याच्या मनात जलविहिरींचा उपयोग जलमहालासारखा करून

पन्हाळ्यावरील तीन मजली अद्भूत अंधारबाव

घेण्याचा होता. विहिरीचा उपयोग भाजीपाला लागवडीसाठी करावा. पण जे लोक लागवडीसाठी पाणी वापरतील त्यांना फुकट पाणी न देता शासकाने त्यांच्याकडून एकचतुर्थांश रक्कम वसूल करावी. त्याचबरोबर कौटिल्य म्हणतो की, विहिरीच्या बाजूला कोणालाही मलोत्सर्ग करू देऊ नये. असे जे मलोत्सर्ग करतील त्यांच्याकडून दंड वसूल करा, असे कौटिल्य आपल्या ग्रंथात स्पष्टपणे लिहितो, याचा अर्थ कौटिल्याला आरोग्यविषयक जाणीव होती हे स्पष्ट दिसते.
 

विहीर नेहमी गोलच का असते?

Sayali Patil

Science Behind The Shape Of Well : खेडोपाडी गेलं असता तिथं विहिरी सर्रास पाहायला मिळतात. गोड्या पाण्याची, निळ्याशार पाण्याची, कासव आणि इतर जलचरांना सामावून घेणारी आणि अनेकांचीच तहान भागवणारी ही विहीर. जमिनीत कैक फूटांपर्यंतचा खड्डा खणून, त्याला अजुबाजूनं दगडी तटबंदी बांधून ही विहीर तयार केली जाते. 

अनेक गावांमध्ये अनेक कुटुंबासाठी विहीर हा मुख्य जलस्त्रोत असतो. डोंगरउतार किंवा भूगर्भात असणाऱ्या पाण्याच्या झऱ्यांचा एकसंध साठा या विहिरीत पाहता येतो. अशा या विहिरीचे अनेक प्रकार सहसा पाहायला मिळतात. कुठं कठडा मोठा असणारी, कुठं जमिनीलाच धरून भूगर्भात खोल असणारी अशी अनेक रुपात ही विहीर पाहता येते. 

काही भागांमध्ये या विहीरी आयताकृतीही असतात, पण त्या फारच क्वचित. कारण, सहसा विहीर ही वर्तुळाकारातच खणली आणि बांधली जाते. पण, कधी विचार केला आहे का की ही विहीर त्रिकोण, चौकोन, षटकोन किंवा इतर कोणत्याही आकारात का बरं बांधली जात नाही? 

विहिरीच्या आकारामागेही आहे विज्ञान... 

विहिरीचा आकार वर्तुळाकार असण्यामागे एक महतत्वाचं कारण आहे आणि ते कारण म्हणजे विज्ञान. ज्यावेळी एखादा द्रव पदार्थ साठवून ठेवला जातो तेव्हा तो ज्या स्थायूरुपातील वस्तूमध्ये ठेवला जातो त्या वस्तूचाच आकार घेतो. द्रव पदार्थ एखाद्या भांड्यात ठेवला जातो तेव्हा त्यामुळं त्या पदार्थाच्या आजुबाजूच्या भींतींवर दाब तयार होतो. 

विहिरीची बांधणी जर चौकोनी आकारात केली, तर त्यामध्ये जमा होणारं पाणी भींतींच्या कोनाड्यांवर सर्वाधिक दाब टाकेल. अशा परिस्थितीमध्ये विहिरीचं आयुर्मान कमी होऊन ती तुटण्याचा धोका अधिक असेल, याच कारणामुळं विहिरी कायम वर्तुळाकारच असतात. ज्यामुळं त्याच्या अंतर्गत भागात असणाऱ्या पाण्याचा समान दाब विहिरीच्या भींतींवर तयार होऊन त्या तुटण्याचा धोका कमी असतो. 

हेसुद्धा वाचा : फणसाच्या बिया कोणी खाऊ नयेत? 

विहीरी वर्तुळाकार असण्यामागचं आणखी एक कारण म्हणजे त्यातील माती जास्त दिवस खचत नाही. पाण्याचा समान दाब तयार झाल्यामुळं हे शक्य होतं. आहे की नाही विहीरीच्या आकारामागचं हे कमाल कारण....

 

संदर्भ :

मराठी विश्वकोश, भाग १६, संपादक तर्कतीर्थ जोशी लक्ष्मणशास्त्री
ऋग्वेद
पानसे, यादवकालीन महाराष्ट्र
मराठवाड्यातील किल्ले, लेखक : कठारे अनिल, पवार शिवाजी
दुर्ग जागले जागले, लेखक : डॉ. शहा जी. बी.
भारतीय संस्कृती-कोश, खंड पा. ९ ते ११, लेखक : जोशी महादेवशास्त्री
गड-कोट-दुर्ग, लेखक : वा. सी. बेंद्रे
बाजीराव पेशवे रोजनिशी, भा. १९८, लेखक : बालाजी वाड
महाराष्ट्रातील उपेक्षित दुर्गाचा इतिहास भाग २, लेखक : डॉ. शहा जी. बी.
औसा किल्ला, लेखक : सुनील पुरी
 

 वाव संस्कृती :-

    लेखाचे शीर्षक वाचून वाचकांना 'हे काय भलतंच' असा प्रश्न पडणे स्वाभाविक आहे. त्यातील 'वाव' शब्द काहीसा खटकणारा आहे. तो आपल्याला बऱ्याच भाषेत सापडतो आणि प्रत्येक भाषेत त्याचे वेगवेगळे अर्थ निघतात. इथे हा शब्द गुजराती भाषेतून घेतला. याचा अर्थ बारव म्हणजेच पायऱ्यांची विहीर असा होतो. प्रत्येक प्रांतातील वास्तूंवर मग त्या किल्ला, राजवाडा, मंदिर आणखी काहीही असो - तिथल्या संस्कृतीचा सगळ्यात जास्त प्रभाव दिसतो. हाच प्रभाव त्या वास्तूंची ओळख बनतो. विहिरी तरी त्याला अपवाद कशा असतील?
'पायऱ्यांच्या विहिरी' प्रकारात मोडणारी जल साठवण्याची माध्यमे भारताच्या विविध प्रांतात आढळतात. आपल्या महाराष्ट्रातल्याही काही बारव त्याबी रचना, प्रवेशमार्गाच्या भितीवरील नक्षीकामातून वेगळेपण ज्यून आहे. करमाळा, साताऱ्याजवळील लिब गावातील बारा मोटांची विहीर, कराडमधील नकट्या रावळ्याची विहीर अशी काही रावे आवर्जून घ्यावीशी वाटतात. भव्य आणि विस्तीर्ण स्वरूपात बांधलेल्या गुजरातमधील विहिरींनी मात्र स्वतःची अशी एक वेगळी ओळख निर्माण केली. साधारण पाच-सहा मजले खाली जाणारा पायऱ्यांचा लांब आणि प्रशस्त मार्ग ही वावची मुख्य खासियत.
   आपल्या देशाला आणि पर्यायाने इथल्या प्रत्येक प्रांताला कित्येक शतकांचा इतिहास आहे. गुजरात राज्य म्हणून १९६० साली स्वतंत्र ओळख मिळालेल्या या राज्याच्या इतिहासाचे मूळ बेट सिंधू संस्कृतीशी जोडले आहे. त्यानंतरच्या कालखंडात इथे कित्येक राजवटी झाल्या. प्रत्येकीने त्या काळात विकसित असलेले वास्तुशास्त्रानुसार विहिरी बांधल्या.
   हडप्पा, मोहेंजोदारोसारख्याच संस्कृतीचे अवशेष अहमदाबादपासून साधारण ८५ किलोमीटर अंतरावर असलेल्या लोथल गावात सापडले. तिथल्या उत्खननात सापडलेल्या विहिरी हल्लीच्या विहिरीसारखीच वर्तुळाकार आहेत पण तिचे तोंड खूपच लहान आहे. अगदी सुरुवातीच्या काळात त्या बांधण्यासाठी निव्वळ दगडांचा उपयोग केला जायचा. गुजरातमध्ये अस्तित्वात असलेली सगळ्यात जुनी पायऱ्यांची विहीर सातव्या शतकातली आहे. नंतर विटा, चुन्याचा गिलावा त्यांना अधिक भक्कम करण्यासाठी वापरण्यात यायला लागला. विहिरींचा आकार वाढवण्याचा आणि शिल्प इत्यादी कलाकृतींनी त्या अलंकृत करण्याचा प्रघात मध्ययुगीन काळात पडला. या लेखात आपण त्याच कालखंडात राजपूत आणि मुस्लिम शासकांनी निर्माण केलेल्या काही अप्रतिम वाव, त्यांचे स्थान, इतिहास, रचना, बांधण्याची शैली या सोबतच तत्कालीन काळात त्यांची असलेली गरज आणि होणारा उपयोग इत्यादी गोष्टींचाही ऊहापोह करूया.

राणीची वाव

  वावेची गरज आणि उपयोग :-
गुजरातसारख्या कमी पावसाच्या आणि उष्ण प्रदेशातील लोकवस्तीला पाण्याची मूलभूत गरज भागवण्यासाठी प्रतिकूल हवामानावर आणि भौगोलिक परिस्थितीवर मात करून काहीतरी उपाय शोधून काढणे गरजेचे होते. नागरिकांना पाण्यासाठी जास्त वणवण करावी लागू नये आणि नगरातच पाणी साठा उपलब्ध असावा हा उद्देश वाव बांधण्यामागची प्रमुख प्रेरणा होती.
या मागचे आणखी एक कारण इथे पूर्वापार चालत असलेल्या व्यापारी संस्कृतीत दडले आहे. व्यापाऱ्यांना, धंदेवाईक मंडळींना सतत प्रवास करावा लागायचा. अशांची संख्याही जास्त असायची. त्यांच्यासाठी तसेच इतर पांचस्थासाठी वाटेतल्या वाव वरदान ठरायच्या, रात्रीच्या मुक्कामाची जागा, माणसे आणि जनावरांसाठी पाणी शोधावे लागायचे नाही. वावमधल्या बहुमजली मंडपांमुळे व्यापाऱ्यांचे जत्थे आले तरी सगळ्यांची स्वतंत्र व्यवस्था व्हायची.
  धनवान लोकांची विवांतीसाठी या जागेला पধि আই असायची त्यांनी या विहिरी बांधण्यामागे धार्मिक आहे. धर्मशास्त्रानुसार तृष्णा भागवण्याला सगळ्या मानले जाते. ते स्वत:ला किंवा निकटवर्तीयांना मिळावे त्या मागे अंतस्थ इच्छा असायची म्हणूनच न्याय कुणाच्यातरी स्मरणार्थ बांधल्याचे उल्लेख आढळतात.
   वावेचा आकार, रचना, पौराणिक दृश्य तसेच देव-देवतांच्या शिल्पांनी भिती अलंकृत करण्यामागेही हाच उद्देश साप तत्कालीन समाज व्यवस्थेनुसार घरातील पाणी भरायार्क जबाबदारी स्त्रियांवरच असायची. हे कार्य निश्चितच सोपे नव्हते. त्यांची अडचण दुसरी स्रीच चांगल्या पद्धतीने समजू शकणा होती. बऱ्याच विहिरीचे निर्माण स्त्रियांनी केले. पाणी भरायला आलेल्यांना उन्हाचा त्रास होऊ नये, विश्रांतीसाठी किया गया करण्यासाठी शांत आणि एकांत जागा मिळेल अशा पद्धतीची बावेची रचना आढळते. पाणी कायमस्वरूपी उपलब्ध राहावे म्हणून त्या बऱ्याच खोल खोदल्या आहेत. पायऱ्यांच्या मार्गामुळे खालपर्यंत पोहचायला सोपे जाते. भोवतालच्या भिंतीवरील शिल्प बघून शीण कमी होतो. देवांच्या मूर्ती असल्याने त्या जागेला धार्मिक महत्त्व प्राप्त होते. पर्यायाने ती जागा स्वचा राहण्यास मदत होते. परदेशातून आलेल्या व्यापारी पांचस्थांनग इथल्या धार्मिक परंपरेची ओळख होते. वावेमुळे पाणी साठवण्यासोबतच ते शुद्धही राखले जायचे.
   वावेचे स्थान : या सगळ्या विहिरीच्या भौगोलिक स्थानाकडे बघून एक गोष्ट प्रकर्षाने जाणवते ती म्हणजे त्यांची निवड खूप अभ्यासपूर्वक केलेली आहे. त्यांच्या शेजारून एखादी नदी वाहताना दिसेल किंवा कुठे तलाव आहे. मोठा जलस्रोत जवळ असल्याने विहिरींना पाण्याचे दुर्भिक्ष जाणवायचे नाही. गुजरातमधल्या एकूण वावेपैकी सगळ्यांत जास्त तत्कालीन प्रसिद्ध व्यापारी मार्गालगत आहे.
   वावेची रचना : 
   वाव ही अशी वास्तू आहे जिचा बराचमा भाग जमिनीखाली असतो. जवळपास सगळ्याच वाव अतिशय सुंदर शिल्पांचा आणि नक्षीकामाचा अलंकार अंगावर मिरवताना आढळतात, बाव्यतिरिक्त त्यांच्या आराखड्यातही समानता सापडते. जमिनीच्या पातळीवर जिथून वावेत प्रवेश करण्यासाठी पाकच्यांचा मार्ग सुरू होतो, तिथे दोन्ही बाजूंच्या खांबावर उभारलेले तोरण स्वागत करायचे. बच्याच ठिकाणी आता त्याचे अवशेष तेवढे अलेले दिसतात.
   अगदी पहिल्या पायरीपासूनच बाजूंच्या भिती शिल्पकलेने नटतात. जसजसे आत उतरायला लागतो तसतशी ही कला अधिक समृद्ध होते. या मार्गावर ठरावीक अंतरावर बहुमजली मंडप उभारले आहेत. पहिला मंडपाला मुखमंडप म्हणतात. ती जागा सहसा साधी, छतविरहित कोपऱ्यांवर खांब असलेली चौरसाकृती असायची, त्यानंतरच्या मंडपाच्या मजल्यांची संख्या प्रत्येक टप्प्याला एकाने वाढायची. बाचे आकारमानही एवढे प्रमाणबद्ध आहे की प्रत्येक मजल्यांची उंची सारखीच असून सगळ्यांत वरच्या मजल्याचे छत जमिनीच्या पातळीवरच आहे. वावेच्या लांबीनुसार मजल्यांची उंची सारखीच असून सगळ्यांत वरच्या मजल्याचे छत जमिनीच्या पातळीवरच आहे. वावेच्या लांबीनुसार मजल्यांची संख्या वाढायची. पाचमजली, सातमजली अशा वाव आढळतात. जेवढे मजले जास्त तेवढी वाव भव्य असा समज असायचा.

अडलज वावेतील खिडकी

   पायन्यांच्या मार्गाचे दुसरे टोक चौरसाकृती किवा अष्टकोणी आकाराच्या कुंडाला जाऊन मिळते. त्यानंतर सरतेशेवटी वर्तुळाकार तोंडाची खोल विहीर (कूप). तिच्यात जास्त पाणी जमा झाले की ते मधल्या दरवाज्याने कुंडात जमा होते. त्यामुळे पाणी असेल त्या काळात ते भरण्यासाठी अगदी विहिरीपर्यंत जायची गरज नाही. कुंडाच्या भोवती फिरायला मार्ग बनवलेला असायचा. कुंड उपडा राहील अशा पद्धतीने त्या भोवती मजले उभारलेले असायचे. प्रत्येक मजल्यावरून तसेच जमिनीवरून कुंड दिसतो. विहिरीचे तोंडही शक्यतो निमुळते असायचे. त्यामुळे पाण्याचा सूर्यकिरणांशी पेट संबंध दिवसापुर काचित तापायांचा मार्ग आणि त्यावरील बहुमजली मंडप त्यानंता कुंड व शेवटी जिचे पाणी साठते ती विहीर खोदकामही वाच टप्याने झाले असावे. त्यामुळे वरचा मजला उभारताना खाली आधार असायचा,
  ही रचना एवढ्यापुरतीच मर्यादित नाही. वाव बांधताना बच्याच बारीक गोष्टी लक्षात घेतल्या गेल्या, भेट विहिरीत उत्तरायता दुसऱ्या टोकावरूनसुद्धा पायऱ्या आहेत. जेणेकरून कोणाला प्रवेशद्वाराच्या तोरणापासूनच्या पायऱ्यांचा संपूर्ण लांब मार्ग चालायची इच्छा नसल्यास तो पर्यायी मार्ग वापरू शकतो. कुठल्याही मंडपाच्या अगदी खालच्या मजल्यावरही हवा खेळती राहील आणि पुरेसा प्रकाश येईल याची काळजी घेतली आहे. आंघोळ, धुणी भांडी इत्यादि कार्य तसेच जनावरांना प्यावच्या पाण्याचे प्रयोजन ध्यानात घेऊन वावेशेजारी टाके, पाट बांधलेले असायचे. आश्चर्य वाटावी अशी या वावेबद्दलची आणखी एक गोष्ट म्हणजे भूकंपप्रवण क्षेत्रात असूनही त्या टिकून राहिल्या. तज्ञांच्या मते तेव्हाच्या वास्तुविशारदांनी हा घटक ध्यानात घेऊन भूकंपाचे धके सहन करू शकेल अशा पद्धतीचे बांधकाम केले. जमिनीचे परीक्षण करण्याचे तंत्र त्यांना अवगत होते असाही काहींचा दावा आहे.
   पाटण शहरातील 'राणी की वाव' ही तिथे असलेल्या शिल्पांची संख्या आणि त्यांची सुंदरता यामुळे सगळ्यात जास्त प्रसिद्ध आहे. तिला २०१४ साली जागतिक वारसा स्थळ म्हणून घोषित केले. अहमदाबादपासून पाटण १४० किलोमीटर अंतरावर आहे. मध्ययुगात अन्हिलपूर किंवा अन्हिलवाड नावाने ओळखले जाणारे हे शहर सोळंकी शासकांची (इ. स. ९६० ते १२४३) राजधानी होती. या राजवंशातील राजा भीमदेव (प्रथम) (शासन काळ १०२२-१०६३) यांची पत्नी उदयमतीने त्यांच्या स्मरणार्थ अकराव्या शतकाच्या अखेरीस ही वाव बांधली.

राणीच्या वावेतील शिल्पकाम

  गुजरातमधल्याच नव्हे तर पूर्ण भारतातील पायऱ्यांच्या विहिरीत ही आकारमानाने सर्वांत मोठी आहे. प्रवेशद्वारापासून ते विहिरीच्या भितीपर्यंतचे अंतर ७० मीटर आहे. विहिरीची खोली तीस मीटरपेक्षा जास्त आहे. या वावबद्दल सांगण्यासारखी आश्वर्याची गोष्ट म्हणजे १९५८ सालापर्यंत या विहिरीचा कोणाला पत्ताच नव्हता. सोळंकी राजवंशाच्या अस्तानंतर या शहराची रयाच गेली. त्यानंतर कधीकाळी शेजारून वाहणाऱ्या सरस्वती नदीच्या पुराने आणलेल्या गाळात ही वाव अक्षरशः दबून गेली.
   भारतीय पुरातत्त्व खात्याने १९५८ साली केलेल्या उत्खननात हा सगळा ऐतिहासिक वारसा उजेडात आला. प्रत्येक घटनेत काहीतरी चांगले शोधायचे असते. जमिनीखाली दडून राहिल्याने इथली दगडी शिल्प टिकले; नाही तर नंतरच्या काळात गुजरातवर झालेल्या परकीय आक्रमणांच्या विध्वंसक कृत्याचे ते शिल्प बळी ठरले असते. वालुकापाषाणात कोरलेले आठशेपेक्षा जास्त शिल्पे इथल्या भितीवर आहेत. माझ्या मते आपल्याला परिचित असलेल्या आणि नसलेल्याही सगळ्या देव-देवता इथे भेटतात.
    महिषासुरमर्दिनी गौरीची बारा रूपे आणि शैवपंथाचा प्रतीक असलेल्या अन्य प्रतिमा, विष्णुची विविध अवतारातील रूपे यासोत भैरव, गणेश, सूर्य, कुबेर, अप्सरा, नागकन्या, योगिनी यांची सुंदर शिल्पे कसलीही नासधूस न झालेल्या स्थितीत बघायला मिळतात. उत्कृष्ट शिल्पकलेनी सजलेली राणी की बाव' आवर्जून बघावी अशी आहे.
   अहमदाबादपासून उण्यापुण्या १८ किलोमीटर अंतरावरची 'अडालज वाव' बधताना आणखी वेगळी वैशिष्ट्ये आपल्या समोर येतात. ही 'राणी की बाव' एवढी आकारमानाने भव्य नाही आणि तिच्या तुलनेने बऱ्याच उशिरा साधारण १४९८ साली बांधण्यात आली. याची रचनाही वर वर्णन केल्याप्रमाणेच आहे. सोळंकी शासन काळात उदयास आलेली वाव बांधणीची पद्धत नंतरच्या राज्यकर्त्यांनीही अंगीकारली. किंबहुना ती 'सोळंकी शैली' नावाने ओळखल्या जाऊ लागली.
   या वावेच्या निर्मितीचा इतिहासही फार रोचक आहे. अडालज व भोवतालच्या छोट्या प्रदेशाला तेव्हा 'दांडई देश' म्हणून ओळखले जायचे. या प्रांतावर वाघेला राजपूत वीरसिंह राज्य करायचा. त्याची पत्नी रूदाबार्डने वाव बांधण्याचे कार्य हानी घेतले. कामाला सुरुवात झाली असेल तोच सुलतान महमूद बेगडाने या प्रांतावर आक्रमण केले. त्याच्यासोबत झालेल्या युद्धात वीरसिह मारला गेला. जेत्याने राणीच्या सौंदर्यावर भाळून विवाहाचा प्रस्ताव ठेवला. रयतेचे हित डोळ्यांपुढे ठेवून तिरे मोठ्या चातुर्याने वाव बांधून पूर्ण झाल्यानंतरच लग्न करायची अट मांडली. काम लवकर पूर्ण व्हावे म्हणून महमूद बेगडाने स्वतःचे कारागीर पाठवले.
  पुढे अशीही आख्यायिका सांगितली जाते की कार्य सिद्धीस गेलेल्या दिवशीच तिने वावेची पूजा केली आणि प्रदक्षिणा घेतानाच तिच्यात उडी मारली. तिच्या मृत्यूनंतर दरबारातील पुरोहितांनी आणि संतांनी वावेत आंघोळ करून तिला पुनश्च पवित्र करावे असे तिने आधीच सांगून ठेवले सुलतानाचे तिच्यासोबत लग्न करायचे स्वप्न अधुरेच राहिले पण त्याने बांधकामाच्यावेळी साह्य केल्याचा परिणाम आपल्याला इथल्या वास्तुशैलीवर दिसतो. हिंदू आणि इस्लामिक शैलीच्या मिलाफाचे वावेत दर्शन घडते.

दादा हरीर वाव

अड्डालजच्या वावेचे मुख्य वैशिष्ट्य म्हणजे तिला तिन्ही बाजूंनी प्रवेशमार्ग आहेत. अशी व्यवस्था असणारी ही एकमेव विहीर आहे. तिन्ही मार्गाच्या पायऱ्या पहिल्या मंडपात एकत्र येतात. इथे उघडे अष्टकोनी छत आहे. मंडपाच्या चारी कोपऱ्याला रक्षीकामाने वेढलेले गवाक्ष व दार असलेल्या छोट्या खोल्या हे या वावेचे आणखी एक वेगळेपण, प्रवेशद्वारापासून विहिरीपर्यंत पोहचताना पाच मंडप लागतात. पहिल्या मंडपासारखेच अष्टकोणी छत विहिरीसमोरच्या कुंडावरही आहे. तिथल्या पायऱ्यांवर बसून वर बघितल्यावर आगळीवेगळी सौंदर्यसृष्टी आपल्या नजरेपुढे उभी असल्याचा आभास होतो. मंडपाचे पाच मजले, त्यांचे खांब, त्यावरील शिल्पकाम डोळ्याच्या मार्गातून आपल्या स्मृतिपलटावर कायमस्वरूपी घर करतात.
   इथल्या भितीवर शिल्पांची कमतरता नाही पण त्यात देव- देवतांच्या वाट्याला अगदीच छोटा हिस्सा आला. कारण उघड आहे. सुलतान बेगडाचे कामावर लक्ष्य होते. तरीही हिंदू संस्कृतीच्या प्रतीकात्मक स्वरूपातील खाणाखुणांनी ही जागा व्यापली आहे. त्यात तुम्हालंला जणू वावेच्या रक्षणासाठी म्हणून दाराच्या पट्टीवर स्थापित केलेले नवग्रह, कल्पवृक्ष, गजशार्दूल, कीर्तिमुख यासारखी शिल्पे सापडतात.    वावेच्या आत शिरून हे सगळे न्याहाळताना वातावरणातील बदलही आपल्याला जाणवायला लागतो. रखरखत्या उन्हातही आत थंडावा असतो. बाहेरच्यापेक्षा हे तपमान पाच ते सहा अंशांनी कमी आहे. विश्वास नसेल तर धर्मामीटरने मोजून बघा असे स्थानिक मंडळी मोठ्या आत्मविश्वासाने सांगतात. वावेच्या एका बाजूला काही धडगी दिसतात. असे म्हणतात की हे शिल्पकाम केलेल्या कारागिरांच्या देहांना तिथे जागा मिळाली. सुलतानाने जेव्हा त्यांना अशीच दुसरी वाव बांधू शकाल का म्हणून विचारणा केली तेव्हा ते बिचारे 'हो' म्हणून बसले. त्याची फार मोठी किमत त्यांना चुकवावी लागली.
   वावच्या भितीवरील कोनाड्यात बसवलेले संस्कृत भाषेतील शिलालेख तिचा संपूर्ण इतिहास आपल्यासमोर मांडतो. त्यातल्या एका ओळीचा अर्थ असा आहे. 'राणी रूदाबाईंनी गंगा नादीसारखी पवित्र आणि उपयुक्त वाव बांधली. जोपर्यंत आकाशात सूर्य आणि चंद्र आहेत, तोपर्यंत ही वाव अशीच भक्कमपणे उभी राहून तुमची तृष्णा भागवो'. वावेचे पाणी आता पिण्यासाठी वापरत नाही तरीही लेखात व्यक्त केलेली अपेक्षा फोल ठरली नाही. पाचशे वर्ष उलटूनही ती टिकून आहे आणि आलेल्यांची तहान भागवू शकेल एवढ पाणी तिच्यात नेहमीच असत,
    अडालजच्या वावपासून चार किलोमीटर अंतरावर 'अंबापूर' है गाव आहे. गावाच्या एका टोकाला असलेल्या अंबामातेच्या मंदिरासमोर काहीशी दुर्लक्षित एक वाव आहे. तिन्ही बाजूचे प्रवेशमार्ग आणि अष्टकोनी छताची रचना सोडल्यास अगदी अडालजच्या वावेची प्रतिकृती म्हटले तरी वावगे ठरणार नाही. कोणी म्हणेल एकसारख्याच दोन वाव कशाला बपायच्या? अपरिचित असल्याकारणाने इथे मिळणारा मोकळेपणा तुम्हांला अन्यत्र मिळत नाही. तुम्ही मंडपाच्या प्रत्येक मजल्यावर जाऊन तिथली शिल्पे न्याहाळू शकता. विहीरीलगतच्या पर्यायी मागनि खाली उतरू शकता. घोडनात काय तर एखाद्या वास्तूची रचना अगदी नीटपणे अभ्यासायची असल्यास अशी आडकाठी नसलेली स्थळे जास्त उपयोगाची ठरतात.
   ही वाव जशी दुर्लक्षित आहे तसाच तिचा इतिहास, त्याबद्दलची फारशी माहिती इतिहासात आढळत नाही पण आपण काही ठोकताळे नक्कीच बांधू शकतो. अडालजच्या वावशी मिळती जुळती असल्याने ही वावही वाघेला राजवंशांच्या शासनकाळात पंधराव्या शतकाच्या अखेरीस पण तिच्याआधी बांधल्या गेली असणार. इथेही धार्मिक शिल्पांपेक्षा आकृत्या, नक्षीकाम जास्त आढळते. याचे कारण काय असेल हा प्रश्न आपल्याला सतावतो. नंतरच्या काळात बांधण्यात आलेल्या वावेत 'सोळंकी शैली'तली फक्त रचना उचलली; मात्र त्यांना अलंकृत वेगळ्या रीतीने केले जाऊ लागले.
   देवतांचे शिल्प घडवणारे कारागीर तेव्हा अज्ञातवासात गेले होते असे नाही. याला प्रमुख कारण ठरले ते परकीय शासनकर्त्यांनी इथल्या भूमीवर राज्य प्रस्थापित केल्यानंतर झालेले सांस्कृतिक आक्रमण. आणखी एक मतप्रवाह असाही आहे की या आक्रमणकर्त्यांची मूर्तिभंजक अशी प्रतिमा आणि त्यासोबत भीतीही स्थानिक राजांच्या मनात तयार झाली. मूर्ती उद्योगात त्यांच्याकडून वावेला धोका निर्माण होऊ नये याची खबरदारी म्हणून या रयत कल्याणकारी राजांनी बांधकाम शैलीत बदल केले.
   त्यांची भीती रास्त होती पवावेच्या वाटपाता तोडफोडीचे भोग आले नाही. त्यांच्याबद्दल असली 'सहिष्णुता' दाखवणे या प्रांताची गरजच होती. पाण्याची गरज काही कुठल्या विशिष्ट जाती, धर्माची नसते. महमूद बेगडासारख्या मुस्लिम शासनकत्यनि अनेक ठिकाणी वाव बांधल्या. त्यातलीच एक वाब अहमदाबाद शहरातील असरवा भागात आहे. स्थानिक लोक तिला 'दादा हरीर वाव' नावाने ओळखतात. महमूद बेगडाच्या जनानखान्याची व्यवस्था सांभाळणारी प्रमुख दाई हरीर सुलतानाने १४८५ साली वाव बांधण्याचा निश्चय केला. त्यानुसार बांधकाम सुरू झाले आणि पुढे तब्बल पंधरा वर्षांनी वाव बांधून पूर्ण झाली. तिच्याच नावाने वाव ओळखली जाऊ लागली. कालांतराने त्या नावाचा अपभ्रंश 'दादा हरीर वाव' असा झाला. वावेच्या बांधणीचा इतिहास सांगणारे संस्कृत आणि अरबी भाषेतील शिलालेख आपल्याला प्रवेश करतेवेळी दिसतात. त्यांच्यामुळे वावच्या निर्मितीची गोष्ट स्पष्ट होते. नाहीतर नावात झालेल्या बदलामुळे ती शोधणे जिकीरचे काम होते. दादा हरीर नावाची पुरुष व्यक्ती आहे असे आपण समजून चाललो असतो आणि तिचा उल्लेख कुठे आढळलाच नसता.
   त्यांनी वाव कोणासाठी बांधली याचे उत्तर संस्कृत शिलालेखातील एका ओळीतून स्पष्ट होतो, जोपर्यंत सूर्य आणि चंद्र आहे तो पर्यंत ही वाव सगळ्यांचे पोषण करो, मग तो घामातून किंवा अंड्यातून जन्माला असो, जमिनीतून किंवा गर्भातून', ती बांधायला झालेल्या खर्चाचा आकडासुद्धा यात नमूद केला आहे. हा खर्च तीन लाख एकोणतीस हजार महमूदीज म्हणजेच तेव्हाचे साधारण तीन लाख रुपये एवढा आहे. अरबी शिलालेखात वाव आणि भोवतालच्या परिसराचे समर्पक शब्दात वर्णन केले आहे. 'हे पवित्र आणि शुद्ध पाणी आहे. चहुबाजूंना रंगविलेल्या व शिल्पकाम केलेल्या भिती असून पधिकांना विश्राम करण्यास उत्तम जागा आहे. तसेच फळांनी समृद्ध असे वृक्ष असलेली वाटिका, विहीर, आणि पाण्याचा कुंड जो माणूस असो की चोर वापरू शकतो.' आजही इथे झाडांचे बऱ्यापैकी अस्तित्व आहे. भोवताली एखादा मोर बागडतांना दिसला तरी नवल वाटून घेऊ नका.
   ही पाच मजली वावसुद्धा सोळंकी शैलीनुसार बांधली आहे. इथे प्रवेश मार्गाच्या आरंभाला तोरणाच्या कमानीऐवजी घुमटाकार बारादरी आहे. तिथून आपल्याला विहिरीपर्यंत घेऊन जायला ९५ पायांचा मार्ग आहे. वावेच्या मागे मशीद आणि हरीर बाईची कबर आहे. समोरच्या अंगणात भुयारी मार्गाचा दरवाजा आहे. हा मार्ग इथून थोड्याच अंतावरच्या का भागात निघतो.
   इथून जेमतेम दोनशे मीटर अंतरावर 'माता भवानी नि वाव' आहे. मूळ वाव अकराव्या शतकात सोळंकी राजांनी बांधली सुलतानाच्या काळात त्यात थोडे बदल झाले असावे. आत असलेल्या भवानी मातेच्या व अन्य मूर्तीमुळे याला जागृत देवस्थानाचे स्वरूप आले. हल्ली इथे पर्यटकांपेक्षा भाविकांची गदाँ जास्त असते. ही शहरातील सध्या अस्तित्वात असलेल्यापैकी सगळ्यात जुनी वाव आहे असे म्हणता येईल. किंबहुना ज्यांनी या शहराला 'कर्णावती' नाव दिले सोळंकी शासनकर्त्यांच्या अस्तित्वाची जाणीव करून देणारी इथे ही एकमेव वास्तू उरली आहे. पाणणसारख्या शहरात जाऊन अस्सल सोळंकी शैलीची वाव बघायचे राहून गेले अशांसाठी अहमदाबादमधील ही वाव पर्याय होऊ शकते.
   बांधकाम शैलीसोबतच या सगळ्या वार्वेना जोडणारा आणखी एक समान धागा आहे. त्यांच्यामध्ये किंवा लगत प्रार्थनास्थळ आहे. मग ते मंदिर असेल किंवा मशीद. यामुळे वाव नुसतीच पाण्याचा स्रोत न राहता तिचे महत्त्व आणखी वाढते. धार्मिक केंद्राचा आणि तिथे होणाऱ्या कार्यक्रमाचा ती एक अविभाज्य अंग बनते. आत देवतांच्या मूती असलेल्या माता भवानी म्हणूर वावेसारख्या ठिकाणाला मंदिराएवढे महत्त्व येते. आपण सत्यनारायणाच्या वेळी घरच्या भितीवर हातांनी कुंकवाचे ठसे उमटवतो तशा ठशांनी दादा हरीर वावची भित भरली आहे. आजही लग्नसोहळ्यानंतर अडालज गावातील लोक नवदांपत्याला वावेच्या दर्शनाला नेतात. त्यांच्याकरवी पूजा करतात. दूध कमी असलेल्या बताळंतीण स्त्रियांनी वावेची पूजा केल्यास बाळाचे पोषण करण्यात तिला येणारी अडचण दूर होते अशीही समजूत आहे. काही शतके आधी तर वावेच्या संबंधित कित्येक प्रथा, उत्सव आणि सोहळे साजरे होत असणार.
बऱ्याच ठिकाणी वावेच्या निर्मिती सोबतच किंवा नंतर प्रार्थनास्थळ उभारण्यात आले. एकाच आवारातल्या ह्या दोन्ही वास्तू एकमेकांना पूरकच होत्या. पूर्वेकडील 'नागर मंदिर शैली' जशी अधिक समृद्ध होत गेली तशी वावेतील कलात्मकता वाढत गेली. फक्त मंदिराच्या धर्मकार्यासाठी वापरात येणारा जलस्रोत पायऱ्या असलेल्या कुंडाच्या रूपात निर्माण केलेला दिसतो. याच उदाहरण म्हणजे सोळंकी शासनकाळात आणि त्या शैलीत बांधलेलं 'मोढेरा सूर्य मंदिरा' समोरचा कुंड. महेसाना जिल्ह्यातील मोढेरा गावी असलेले हे सूर्य मंदिर अहमदाबादपासून शंभर किलोमीटर अंतरावर आहे. पुष्पावती नदीच्या काठी वसलेल्या या गावाचा पुराणात 'धर्मारण्य' नावाने उल्लेख सापडतो.
   गाभाऱ्यातील भितीवरील शिलालेखानुसार सोळंकी राजा भीमदेव प्रथम १०२७ साली मंदिराचे निर्माण केले. याचे प्रमुख तीन भाग आहेत. सूर्यकुंड, सभामंडप आणि गाभारा. सभामंडपासमोर बांधलेल्या शिल्पांकित आयताकृती कुंडाचे आकारमान ५२ x ३७ मीटर एवढे भव्य आहे. धर्मशास्त्रानुसार आंघोळ करून देवाचे दर्शन घेण्याचा रिवाज आहे. हा उद्देश ध्यानात घेऊन कुंड बांधले. चहूबाजूंनी आत उतरायला पायऱ्या असलेल्या सूर्य कुंडाचे वैशिष्ट्य म्हणजे या पायऱ्यांच्या मार्गावर १०८ लहान मोठी मंदिरे आहेत.
    वर सांगितलेला नियम हिंदू धर्मापुरता मर्यादित असला तरी मुस्लिम शासकांनीही त्यांच्या प्रार्थनास्थळाजवळ अशाच काही विशिष्ट कारणासाठी (वुदुः नमाजापूर्वी हात पाय धुणे) कुंडासारख्या वाव बांधल्या. चंपानेर-पावागाढ या जागतिक बारसा स्थळी आपल्याला अशा राखीव वाव बघायला मिळतात.
     इथल्या सोळाव्या शतकाच्या अगदी सुरुवातीला बांधलेल्या जामी मशीदजवळ 'हौज-ए-वझ' (अष्टकोणी तलाव) आहे. प्रत्येक बाजूंनी आत उतरायला पायऱ्यांची व्यवस्था आहे. सरतेशेवटी मशिदीपासून दोन किलोमीटर अंतरावर असलेल्या चक्राकार वावेचा आवर्जून उल्लेख करावा वाटतो. ही चाव सोळंकी शैलीत मोडत नाही किंवा शेजारी कुठले प्रार्थनास्थळ नाही. वरून महादेवाच्या पिंडी सारखा आकार असलेल्या या विहिरीत आत उतरायला चक्राकार पायऱ्या आहे.
अशा कित्येक वाव चंपानेरला सापडतात. याची पूर्वीची प्रमाणात नाही पण हे वर्णन थोड्या फार फरकाने गुजरातमधील ओळखच 'हजार वावांचे शहर' होती. अगदी एवढ्या विपुल सगळ्याच जुन्या महत्त्वाच्या शहरांना लागू पडायचे. पुढे काही काळाच्या ओघात लुप्त पावल्या. बऱ्याचशा मानवी अतिक्रमणाच्या बळी ठरल्या. सोळंकी शैलीत बांधलेल्या आणि इतक्या काळानंतर आज या राज्यात बऱ्यापैकी सुस्थितीत असलेल्या अशा पायऱ्यांच्या विहिरींची संख्या सव्वाशेच्या घरात नक्कीच आहे.
तिथल्या वाव सस्कृतीचा थोडा बहुत अभ्यास केल्यानंतर तिच्याकडे बघण्याचा आपला दृष्टिकोण बदलतो. मग ती निव्वळ पाण्याचा स्रोत राहत नाही. लोकांची धार्मिक गरज भागवणारी, तेव्हाच्या समाजव्यवस्थेचा केंद्र असणारी वाव त्यांच्या आयुष्याचा अविभाज्य अंग असलेली वास्तू दिसायला लागते. वावमधल्या पाण्यात आणि पर्यायाने तिच्यात तिथले जनजीवन सुरळीत राखण्याची आणि त्यांच्या विकासात हातभार लावण्याची कुठलीतरी दैवी शक्ती असावी असा विचार मनात डोकावतो.

भ्रमणध्वनी : ९९६०५६५४४५
Email: amol.sande@gmail.com

संदर्भग्रंथ
1. Livingston Morna, Step to Water: The Ancient Stepwells of India Princeton Architectural Press, New York.
2. Gazetteer of the Bombay Presidency - Volume 4-Ahmedabad, Government Central Press, 1879.
3. Jutta Jain-Neubauer, The Stepwells of Gujarat: In Art Historical perspective Abhinav Publications, New Delhi, 1981.
4. Mankodi Kirit, Rani Ki Vav, Patan Archaeological Survey of India, 2012.
5. World Heritagr Series Champaner-Pavagadh Archaeological Survey of India, 2009.
6. Solanki, Pravinsinh M. and Sanjay C. Oza, Sun Temple-The Fragrance of Modhera

 
 

जल व्यवस्थापनाचा अजोड नमुना - राणीची विहीर

 







जल व्यवस्थापनाचा अजोड नमुना - राणीची विहीर

उत्तर गुजरातच्या पाटण येथील प्राचीन, नक्कशीदार आणि अनोखी अशी राणीची विहीर (स्टेपवेल) आहे. १ हजार वर्षांपूर्वी बांधलेल्या विहिरीचे वैशिट्ये म्हणजे या विहिरीत ७ मजली भव्य राजवाडा आहे. ही विहीर म्हणजे तंत्रज्ञानाचे एक उत्कृष्ट उदाहरण असल्याचे मानले जाते. भूमीगत जल वापर आणि जल व्यवस्थापनाचा हा अजोड नमुना असल्याचे मत युनेस्कोने व्यक्त केले आहे. त्यामुळेच यूनेस्कोने या राणीच्या विहिरीला २०१४ मध्ये वर्ल्ड हेरिटेज साइटमध्ये स्थान दिलंय. रिझर्व बँक ऑफ इंडियाकडून नवीन १०० रूपयांची नोट जारी केली गेली. या नोटेच्या मागच्या बाजूला राणीच्या विहिरीचा फोटो देण्यात आला आहे. या फोटोचा वापर देशाची संस्कृती दर्शवण्यासाठी नोटेवर करण्यात आला आहे.
राणीच्या विहिरीची निर्मिती
रानी की वाव इ.स. १०६३ मध्ये राणी उदयमतीने आपला दिवंगत पती राजा भीमदेव याच्या स्मरणार्थ बांधली होती. सुमारे सात शतके ही मौल्यवान वास्तू सरस्वती नदीचे पाणी आणि गाळात रूतलेली होती. १९८० च्या दशकात भारतीय पुरातत्त्व खात्याने या विहिरीचे उत्खनन केले असता ही सातमजली खोल, पायऱ्यांची आणि कलाकुसरीचे नक्षीकाम केलेली विहीर अतिशय उत्तम स्थितीत सापडली होती.
विहीर नव्हे प्रेमाचे प्रतीक
राणीची ही विहिरीच्या रचनेने जगभराला आश्चर्यचकित केले आहे. १०-११ व्या शतकात याची निर्मिती सोळंकी राजवंशाच्या राणी उदयमती यांनी त्यांचे पती भीमदेव यांच्या स्मरणार्थ केली होती. त्यामुळे याला प्रेमाचे प्रतिकही म्हटले जाते. राजा भीमदेव हेच सोळंकी राजवंशाचे संस्थापक होते. त्यांनी वडनगर (गुजरात) वर १०२१ - १०६३ या काळात राज्य केले.
वास्तूरचना - कलाकृती
राणीच्या या विहिरीची वास्तुकला अत्यंत अनोख्या पद्धतीची आहे. पायऱ्या सरळ आहेत. पण, त्यावरील कोरीव काम वैशिष्ट्यपूर्ण आहे. सुमारे ६४ मीटर लांब आणि २० मीटर रुंद असणारी ही विहीर २७ मीटर खोल आहे. या विहिरीच्या निर्मितीसाठी नक्षीकाम केलेल्या दगडांचा वापर करण्यात आला आहे. विहिरीतील खांब आणि त्यावर कोरलेल्या कलाकृतींमध्ये अजूनही सोळंकी वंश आणि विष्णूच्या विविध अवतारांची रुपे यांची चित्रे कोरण्यात आली आहेत. त्यातून तत्कालीन संस्कृतीचे दर्शन होते. विहिरीच्या भिंतीवर लावण्यात आलेल्या खुंटीही अत्यंत आकर्षक आहेत.
भुयार
सरस्वती नदीच्या तटावर असलेल्या या विहिरीत एक छोटे दारही आहे. त्याठिकाणापासून ३० किलोमीटर लांबीचे भुयार आहे. मात्र, हे भुयार काही ठिकाणी दगड, चिखलामुळे बंद झाले आहे. राणी उदयमतीनेच ते बंद केले होते, असे म्हटले जाते. पाटणच्या सिद्धपूर शहरात हे भुयार निघते. युद्धाच्या काळात पळण्यासाठी याची निर्मिती करण्यात आली होती. त्याची माहिती केवळ राणी व तिच्या विश्वासू सहकाऱ्यांनाच होती. अशाप्रकरची देशातील ही एकच विहीर असल्याचे बोलले जाते.
पोस्ट - श्रीकांत माने यांच्या वॉलवरतून साभार

 
 

– आशुतोष बापट 8605018020 ashutosh.treks@gmail.com

(अधिकची माहिती दिलीप पोहनेरकर 9422219172 (जालना येथील पत्रकार) यांच्या लेखातून)

 

discovermh.com

 


http://maharashtra-bhakti-shakti.blogspot.com/2019/08/blog-post.html



======================


 
 

संदर्भग्रंथ:-


कसे जाल:-

पुणे - नसरापूर - शिरवळ - खंबाटकी घाट.


 

Baravs found in Pune

Once upon a time, baravs were an inherent part of many settlements and temple precincts in Pune. A barav next to a shade-giving tree is a common sight in some of villages of Pune even today. Elsewhere, although baravs may have been destroyed over a period, their memory remains intact amongst the older generation of people. Interestingly, in the Junnar taluka (a block) a village itself is named as ‘Barav’ after an old barav which once existed there. In short, baravs were an inseparable part of many settlements.

Map of Pune district showing the location of Manchar, Loni Bhapkar and the city of Pune.

This story talks about two baravs which are more than 600 years old, built somewhere in the early 14th century. One of them is found at Manchar town in Ambegaon taluka and the other one is found at Loni Bhapkar village in Baramati taluka of Pune district. The barav at Manchar is still used by the people for bathing and swimming. The one at Loni Bhapkar is part of a temple complex and has religious significance. Although its waters have become unfit for domestic use over time, it is an excellent piece of architecture displaying artwork in basalt rock.

The barav at Manchar

The town of Manchar was once a small village during medieval times, located on the trade route connecting the historic towns of Paithan (famous for its sarees) and Junnar. The barav found in Manchar is a beautiful one located next to a small water course called as ‘Khardi Nala’. This barav is fed by a natural spring and contains ample water throughout the year.

Interplay of colours and contrasts at the Barav at Manchar

The barav at Manchar is nearly a square which tapers from a width of 22 metres on its topmost side to nearly half the length (11 m) at the bottom side. It has two entrances – one from the south and another from the east. After descending down from these two entrances, one reaches to an intermediate landing that has a raised seating platform.

Steps are a striking feature of this barav. Adjacent steps contain protruding stone blocks at regular intervals to counterbalance the thrust of the soil from behind. They also act as intermediate seating platforms, creating a beautiful rhythmic pattern, which highlights the aesthetic side of structural elements.

A stone inscription housed in the western parapet wall, narrates an interesting story about the construction of this barav. According to the Sanskrit inscription, Manichar (previous name of Manchar) was a beautiful village stationed in the hills of Amargiri. In Manichar, there lived an able, just, brave, and handsome person named Ladidev, who was the son of the village head (mentioned as pattelvarya). One night in his dream, Ladidev sees Mother Earth expressing her wish to permanently reside in his village. Waking up the next day, Ladidev recollects his dream and decides to build a barav at a suitable spot in the village where Mother Earth would permanently reside in the form of water. He thinks that the barav would also help in relieving the water stress conditions experienced by the villagers of Manchar due to frequent droughts. With these considerations, Ladidev initiates the construction of the barav on an auspicious day in the Shaka Samvat year 1266 (i.e. 1344 A.D.) (Ref: Mandake, G, 2003).

Today, the barav is popular amongst the people of Manchar as ‘angholichi barav’ (meaning barav used for bathing). Many adults and school-going kids assemble at the barav during early morning hours for bathing.

“We love swimming in this historical barav. It is always full with water, even in summer. We come here as early as 5 am and enjoy swimming until the afternoon sometimes. Applying soap and bathing in the barav is prohibited, so as to keep its water clean”

– a regular user of the barav.

A small channel carries water from the barav into a kund, which is a small stepped pond located on its eastern side. Women assemble at this kund daily for washing clothes. Thus, while the barav becomes a social interaction space for men, the kund becomes an interactive space for women, who get a break from their daily routine and find a few leisure moments for chatting with each other while washing their clothes.

The barav at Loni Bhapkar

 


Loni Bhapkar village contains a beautiful barav built way back in the 14th century. The barav is part of a sacred precinct, originally containing temples of Shiva and Vishnu. Today, the original Shiva temple is in a dilapidated condition, while a new Dattatray temple has been built in place of the Vishnu temple. Interestingly, the barav is placed strategically at the focal point of the two temples, highlighting its significance and sacredness in the entire complex. Earlier, as part of religious rituals, people would take a bath in the barav before entering the temple. They believed that such ritualistic bathing washed away their sins and purified them before entering the sacred temple.

This barav is square-shaped with sides measuring 21 m at top and 14 m at the bottom, containing a series of steps carved in basalt rock. The entrance to the barav is from the southern side from where one descends down a few steps to reach the intermediate landing. The barav stands out because of its parapet wall which contains attractive devkoshta (niches) and a mandap (pavillion).

The two-metre high parapet wall of the barav acts as a kind of threshold, separating terrain and water. It contains 24 attractive devkoshtas forming a rhythmic pattern. Once upon a time, they housed idols of Vishnu in different forms. They reminded people about the sacredness of baravs and discouraged them from indulging in any acts that would pollute their water. Such kind of architectural detailing highlights the effective use of religious and spiritual ideas to encourage the water management practices of health and hygiene amongst people.

A square mandap with a roof supported by brackets resting on four circular pillars protrudes into the barav from its western side. Since the mandap was located outside the Vishnu temple, it is believed to once contain the idol of Varaha – one of the incarnations of Vishnu having the head of a wild boar and the body of a man. The remains of this idol can be seen today beneath a tree next to the barav. Apart from housing the idol, the mandap has a seating platform for people to relax and reflect in the presence of water. The external surface of the mandap is divided into panels by columnar motifs. The panels contain figurative motifs depicting the different incarnations of Vishnu and scenes from the Ramayana.

Despite the structural differences between the baravs at Manchar and Loni Bhapkar, both of them share some commonalities. Firstly, apart from minor structural damages, and wear and tear, both the baravs are in reasonably good conditions even after 600 years. They are fed by an ample quantity of safe groundwater even today. These facts demonstrate the engineering skills and hydrogeological knowledge of the people who built these baravs. Secondly, both the baravs are taken care of by their respective local communities. For instance, in 2019, few men from Manchar volunteered for cleaning and desilting the barav, as told by one of the volunteers Mr. Dhanesh Raut. He also said that every year during Diwali they light oil lamps on the steps of the barav.

People lighting oil lamps on the steps of barav at Manchar. (Source: Raut, Dhanesh, 2022)

Conclusion

In addition to the two baravs discussed in this photo-essay, there exist few others in and around Pune. However, most of them are in a ruined condition. Today, the usefulness of baravs as water storage structures may have declined due to relatively easy access to tap water. Despite this fact, we cannot neglect their value and turn them into places for dumping waste. We need to understand that baravs are much more than mere water storage structures. They have heritage value and have once served as community spaces with socio-cultural and socio-technical identity. Most importantly baravs connect people to water by enabling them to see, hear and touch water.

Currently, when water is increasingly seen as a commodity to be exploited to the fullest, protecting baravs becomes essential as they manifest our ancient cultural values of respecting, sharing and using water with utmost care, which is a precious gift from nature to humankind.




 

 

The Stepwells Project by Manish Pimpley

Baramotechi vihir, Limb
Commissioned in 1724 CE the well water was used to irrigate mango orchard, plantation nearby.

Water is a pivotal force, for physical sustenance and for deep spiritual significance in Indian culture. Across India, water management systems have thrived, notably in arid regions, with stepwells as vital elements.
Stepwells, colloquially known as baav, vav, barav, and in various other regional names, are architectural wonders built to conserve water. These structures, once vibrant community centers and lifelines for settlements, have weathered time’s trials. Sadly, shifting development priorities have led to neglect and disrepair for some, fading echoes of their once-cherished purpose.

Venturing into Western Maharashtra for Stepwells reportage project, my trail was to trace these historical marvels and capture the life that surrounds them. These stepwells, embedded in the land’s history, served diverse roles—providing water for settlements, agriculture, and trade routes, also fostering social gatherings and religious rituals.
There are over 1800+ stepwells geo-tagged and mapped in state, each carries tales of its own. From the elaborate architectural designs— be it square, rectangular, circular, or octagonal— to their cultural significance, these stepwells hold a mirror to the past. Their construction based on geological insights and hydrological knowledge of ancient times highlights a sustainable approach that we need to revisit in today’s water-starved regions.

My journey unveiled the varied facets of these stepwells—their geometry, layouts, significance in religious complexes, and integration with the surrounding environment. Some, nestled near temples or amid lush landscapes, stood as serene testaments to craftsmanship and purpose.
Diving deeper into their stories, I encountered stepwells like the Baramotechi vihir and Bajirao vihir designed with resting and meeting spaces, stepwells at Nashik for bathing and rituals purpose, Baneshwar temple stepwell has mausoleum nearby, stepwells at Mallikarjun temple and Ramling temple were activity hubs. While some stepwells, like the Manchar Stepwell, served utilitarian purposes solely for bathing, others, like the Ranjeshwar temple Kund, showcased intricate water management systems, offering insights into ancient water prioritization techniques. Hatti-Barav was unique being source water supply system for city. Each discovery revealed more than architectural prowess; they held tales of heroism, communal efforts, and the intertwining of history with these structures.

These stories weren’t limited to the stepwells alone; they extended to people past and present around… hero stones near Loni Bhapkar stepwell, rituals like pinda-daan at kunds, and the lineage records meticulously preserved by keepers through the ages. The effort to preserve stepwells in Maharashtra, driven by initiatives from locals, volunteers, passionate individuals, and active groups, is particularly a special story. Such endeavors, while inspirational, require collaborative efforts involving communities, experts, and authorities for sustainable success.

Stepwells aren’t just historical relics; they embody a sustainable solution to today’s water crises. Integrating traditional water systems, reimagining these reservoirs, and fostering community engagement could help combat water scarcity, preserve heritage, and create vibrant communal spaces.
My journey through these stepwells was a quest to document their tales, cultural heritage, and inspire a collective appreciation for our ancient wisdom. I carry the hope that these stories spark renewed interest and drive preservation and revival of stepwells across India.

Manchar Stepwell, Manchar
The stepwell at Manchar popularly known as the ‘bathing barav’ was built during the 14th century. Due to the presence of the stream near the site, the groundwater table is high, and the barav does not become dry even during the summer. Overflow from the well gets released into the nearby stream. Unlike most other stepwells, this one is not a part of any temple complex and was constructed solely for a utilitarian purpose. A stone tablet placed in its parapet wall along the western side mentions that the village head of Manchar constructed it as part of drought relief work.
Mallikarjun Temple Stepwell, Loni Bhapkar
The stepwell called puskarni here presents a harmonious structure, impeccably maintained, enclosed by a stone wall adorned with 24 niches facing the tank. These niches possibly once housed images of Lord Vishnu, each depicting an intriguing narrative. The serene ambiance of this place invites solitary contemplation, drawing visitors to immerse in its tranquility for hours. The pavilion’s intricate carvings showcase a diverse array of imagery, inviting closer scrutiny. Surprisingly devoid of visitors, this temple complex, set in a remote location, holds immense historical and architectural significance.

At the bustling Ram Kund, Nashik
Sacred ritual, pinda-daan, unfolds—a tradition steeped in reverence for moksha or liberation of dead soul in family. Male folks tonsure head and perform pooja or worship at the steps or near kund. The dip in water has significance. Here you also encounter lineage record keepers – family records maintained over centuries! They document life and death and people who visited.

Baramotechi vihir, Limb
The well water was used to irrigate mango orchard, plantation nearby. It’s a private property of heirs now, open for public viewing. Large wide steps lead down inside the well, further an underground arched gate made of stone lead to stoned pathway over a rectangular chamber towards octagonal well. One would be surprise to this marvel which looks like a small underground palace. Built in Maratha architecture with simple decorative elements or motif on the sculptures, arches, viewing gallery, space for a small gathering, and levels arrangement, with multiple accesses through step adds to the beauty. It is named due the fact that it has twelve outlets for pulling water from well with bullocks with a mot-bucket.

Three kund at Ranjeshwar temple, Ranje
The system of kunds exhibits a creative approach to water management. It ensures that water is utilized without any wastage. Moreover, through its design, it sets a priority for utilizing the available water. Firstly, for drinking; then for bathing; then for washing; and lastly for agriculture.
Ramling temple Stepwell, Gursale.
Stepwell attached to a 13th century Shiva temple with hemadpanti architecture and carved in black stone.
Hero stones, Veergal can be found in the village; period of these is identified based on jewelry, weapons, hairstyle on the carvings- get traced to various dynasties.

 

The Saptamatrikas are ancient seven rural goddesses, revered in rural areas as embodiments of natural elements like rivers and ponds. Aasara refers to water nymphs, residing around water bodies, guarding against those who disrespect water bodies or wander with malicious intent near riverbanks. There was practice of each lineage worshiping a family deity, performing practices for family prosperity and stability.
Trip to Mallikarjun temple, Loni Bhopkar led to multiple sites of interest in the village including couple of stepwells, well worth exploring. The temple complex is perhaps be most well-known facing an elegant step-well known locally as puskarni…
Varaha or Yadnyavaraha statue and the intricate carvings adorning this pavilion showcase an extensive array of imagery.
Mallikarjun temple dedicated to Shiva. Pillars, walls, beams, central ceiling has wonderful carvings of tales from puranas.
Extraordinary set of Hero Stones collected from the vicinity at the Someshwar temple.
Parshuram temple Kund, Dhawadshi was major source of water for villagers.
Hatti-barav, Ahilya Nagar
Ahmednagar (now Ahilya Nagar) district had as many as 1718 wells with step discovered and documented by British Gazetteer in 1884. Hatti-barav believed to be from the Yadav period 1200 CE, rebuilt and extended diligently by administrator of the Nizam Shahi regime, Vazir Salabat Khan. Essentially, this stepwell served as an excellent example of city water management in the 17th century during the medieval history of Maharashtra.

 

It was reservoir supplying water to the city, had a mechanism to draw water with elephant hence the name hatti-barav (elephant well), and infrastructure including terracotta pipe for water supply. There is an independent chamber for large water storage, a ramp for access, a channel adjacent to it, and a distribution chamber. Remnants of these elements, channels, terracotta piping can still be seen around.

Yavateshwar temple, Yavateshwar was a pleasant drive up hill. Met a group of tourist there.

 

Stepwell at Yavateshwar temple. A pond structure to store water.
Bajirao vihir, Satara
The well built in mid 18th century in Satara city by Shahu Maharaj. It is named after Bajirao Peshwe who used to stay in nearby palace for some period in the year. 100 feet deep the well has 9 stone arches and in L shape. Well was use before the teracotta piping. There is effort to maintain the well; it was in news recently to get featured on Indian post card.

 

Baneshwar temple, Talegaon Dabhade
Brahman Doh at Talegaon Dabhade
Somewhat concealed, in a small section of woodland is a hidden gem. An employee at crematorium help me locate and tell about the same. A small flight of steps leads down to a circular pool, with a passage way to one side that flanks the pool via a series of archways. Seems efforts is made to remove vegetation from around the structure time to time which grow back again. But it’s clear this place has been mostly forgotten.
Near the temple, tucked away under trees and probably missed by many visitors, is the Samadhi of Sarsenapati Khanderao Dabhade. This is an intriguing mausoleum, relief carvings while not exquisitely detailed still well executed and cover the exterior on all four sides of the initial platform. There is also Samadhi of Sarsenapati Umabai Dabhade, wife of Khanderao Dabhade, who was the first and only woman to become Commander-in-Chief of the Maratha forces in 1732. The village name include the family name Dabhade as honor and remembrance to the family.

 

Stepwell at Baneshwar Teample, Talegaon Dabhade
Located in an old temple premises. Nandi outside the temple and stepwell an impressive tank pushkarni, known locally as Naske Thale, used currently to water plantation.
Ghumtichi Vihir, Talegaon Dabhade
Most of the stepwells near temples, are near Shiva temple, some near crematorium. For the next stepwell Ghumtichi Vihir I had to trek about couple of kilometers, cross crematorium and a railway line. That also prepared me for the interesting experiences and locations, project was taking me to. Most of the heritage structures including stepwells has shilalekh- inscription or engraving often hold historical, religious, or cultural significance and provide information. Here the inscription show it being commissioned in 1723 CE.

 

Bhagirathi Kund at the SopanDev Samadhi mandir (Mausoleum). Villagers catchup at the templeafter the prayers. 

Sketches at BaraMotechi Vihir Stepwell

Ram Kund Ranjeshwar temple Kund

Hatti Barav



 
 

१.(Photo - Vijay Mathane)

२.(साभार- Vidarbha Darshan)

३.Indian Village Directory | villageinfo.in

४.Mishra, Jai Prakash (1993). Researches in social sciences. ISBN

माहितीबद्दल धन्यवाद सर. माझा नेहमीचा मार्ग असून मी ही बारव पाहिली नाही. यावेळी नक्की पाहणार.

या पेक्षा एक प्राचीन बारव अमरावती जिल्ह्यातील महिमापूर या ठिकाणी आहे. ही बारव अनेक मजली आहे. स्थानिक इतिहासकारांच्या मते ही बारव इसवीसॅन पूर्व दुसऱ्या शतकातील म्हणजे मौर्य कालीन आहे. कदाचित भारताच्या अतिप्राचीन विहिरींपैकी एक. पण शासनाच्या दुर्लक्षतेमुळे कोणालाही माहिती नाही.


इजिप्तच्या वास्तुकलेशी काहीसे साम्य असलेल्या या वास्तुची निर्मिती इ.स ६ मधिल असल्याचं सांगितले जाते. पण नेमका इतिहास नाही. पंरतू या बारव जवळ मारूतीचे देऊळ असल्याने चालुक्याच्या काळात हा बारव तयार केला असावा.

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 



·
फॉलो करा

 

 


hindi.indiawaterportal.org

बारव स्थापत्य

इंडिया वाटर पोर्टल

प्राचिन वास्तूशास्त्र विषयक ग्रंथात भू-परिक्षा विषयक तपशील मिळतात. माणसार वास्तूशास्त्र विषयक ग्रंथात भू-परिक्षा विधान याविषयी चर्चा आली आहे. याविषयीचे काही सूत्र परंपरेने केलेल्या सूक्ष्म निरिक्षण व अवलोकनानंतर दिली गेली. कुठलाही जलाशय निर्माण करण्यापूर्वी पारंपारिक शहाणपण व त्यातून सिध्द झालेली काही सूत्रे यांचा उपयोग होत होता.

विहीर ही भारतीय संस्कृतीने जगाला दिलेली देणगी आहे असे मानले जाते. भारतीय संस्कृती मध्ये अगदी पारंपारिक काळातसुध्दा उपलब्ध नैसर्गिक पर्यावरणाचा आणि भूस्तर रचनेचा अभ्यास करण्यात आला होता. असे वैदिक वाङमयातील नोंदी विशेषत: ऋग्वेद, अथर्ववेद परिशिष्ट यात पाणी व्यवस्थापन व जलप्रवाहाच्या संदर्भात काही नोंदी मिळतात. राहाटगाडगे किंवा अश्मचर्क याविषयीच्या नोंदी आल्या आहेत, वहारमीहीर याच्या बृहत्संहितेमध्ये उदकार्गल नामक अध्यायामध्ये (५८) याविषयाच्या काही नोंदी आहेत. तसेच कौटिल्य अर्थशास्त्रात सुध्दा आपणाला उपलब्ध होणार्‍या माहितीचा विचार आहे. कुठल्या भूप्रदेशात निश्‍चित किती पाणी उपलब्ध होईल, त्यात पावसापासून उपलब्ध होणारे पाणी किती असेल, याविषयीचे काही आराखडे नोंदविले आहेत. याशिवाय अगदी महाभारत, रामायण सारखे महाकाव्य, बौद्ध जातक कथा व वाडमय या सर्वांमधून पाणी व्यवस्थापनाविषयी नोंद मिळते. पौराणिक साहित्याचा विचार करता माणसाने करावयाच्या समाज उपयोगी कामामध्ये वापी, कुप, तडाग यासारख्या वास्तूंच्या निर्मितीसाठी प्रोत्साहन दिल्याचे दिसते.

वापी कूप तडागानि देवतायतनानि च।

अन्नप्रदानमारामं पूर्तमित्यभिधोयते॥

अपरार्क टिकेमध्ये पूर्तकर्मविषयक आलेला हा श्‍लोक महाभारतातून घेतला आहे.

इष्टकर्म हे माणसाच्या व्यक्तिगत जीवनात महत्वाचे असले तरी पूर्तकर्म हे समाजासाठी अशा प्रकारची बांधकामे करतांना परिसरातील भूस्थर रचनेची चांगली माहिती असावी लागते. भावप्रकाश या ग्रंथात विहीरीचे लक्षणनोंदवतांना म्हटले आहे की, अल्पविस्तार असलेल्या भूमीत खोल व गोलाकार, खणलेली - बांधलेली विहीर होय. कौटिल्य अर्थशास्त्रामध्ये नोंदवले आहे की, मातीला लोणा लागणार नाही, अशा जागी चौकोनी विहीर खोदावी. तिचा तळ आणि सर्व बाजू बांधून काढाव्यात. तिला भुईसपाट लाकडाची बळकट दारे असावीत, तिच्यात तीन मजले व अनेक कोठड्या असाव्यात. अशा विहीरींच्या संदर्भात अनेक प्रकारच्या साहित्यिक नोंदी उपलब्ध होतात.

प्राचिन वास्तूशास्त्र विषयक ग्रंथात भू-परिक्षा विषयक तपशील मिळतात. माणसार वास्तूशास्त्र विषयक ग्रंथात भू-परिक्षा विधान याविषयी चर्चा आली आहे. याविषयीचे काही सूत्र परंपरेने केलेल्या सूक्ष्म निरिक्षण व अवलोकनानंतर दिली गेली. कुठलाही जलाशय निर्माण करण्यापूर्वी पारंपारिक शहाणपण व त्यातून सिध्द झालेली काही सूत्रे यांचा उपयोग होत होता. आजही अंगी असलेल्या काही दैवी शक्ती आधारे परिसराची पहाणी करून विहीरींची जागा दाखवणार्‍या व्यक्ती मिळतात. अशा व्यक्तींना पायाळू असे संबोधतात.

त्या त्या विशिष्ट प्रदेशातील भूस्थर रचना यांचा अचूक अंदाज घेवूनच प्राचिन शास्त्रग्रंथातून भूमी परिक्षा करण्यासाठी उपलब्ध क्षेत्र त्या परिसरातील वृक्ष जमिनीचा स्पर्श, गंध, रंग व नाद यांचा आधार घेतला जाई. परिसरातील खडकाची घडण, मातीचा पोत, स्थानावरील वनस्पती व प्राणीजन्य खुणा यांचा अभ्यास करण्यात येई व अनेक वर्षांच्या अनुभवानंतर काही सूत्र सिध्द करण्यात आलेली होती. उदा. जर जांभळाच्या पूर्वेस जवळ वारूळ असेल तर त्याच्या दक्षिणेस दोन पुरूष खोलीवर गोड पाणी लागते.

ज्या वृक्षाच्या फळास किंवा पुष्पास विकार (फळ किंवा पुष्प सदृष्य) असेल त्या वृक्षाच्या पूर्वेस तीन हात पुढे चार पुरूष खणले असता पाणी लागते. त्याची खूण म्हणजे खाली दगड व पीतवर्ण (पिवळ्या रंगाची जमीन) असेल.

वड, पळस, उंबर हे एकत्र असतील, तेथे खाली उदक आहे. वड व पिंपळ हे एकत्र असतात, तेथेही वृक्षांच्या उत्तरेकडे चार हात खणले तर पाणी लागेल.

ज्या भूमीवर मुंज, काश कुश यापैकी एका प्रकारचे गवत उपलब्ध आहे व जमीन निळसर, खडकाळ आहे, किमान काळी अथवा तांबड्या (लाल) रंगाची असेल, तेथे विपुल गोड पाणी असते. अग्निपुराण तसेच कृषिपराशर व अन्य स्मृती ग्रंथात याविषयीच्या नोंदी आहेत.

विठ्ठलाजी शास्त्री धारूरकर यांनी उपयुक्त धर्मशास्त्र संग्रह या ग्रंथात (मुंबई शके १८२६) याविषयी चर्चा केली आहे. तर च.धु. देशपांडे यांनी महाराष्ट्राचा भूगोल (दिल्ली १९७६) यामध्ये महाराष्ट्राच्या भूस्तर रचनेची व डेक्कन ट्रॅप किंवा बेसाल्ट या अग्निजन्य खडकाची वैशिष्ट्ये स्पष्ट केली आहेत. यातून भूपृष्ठ व भूजल यांच्या वापराविषयी नोंद केली आहे. अग्निजन्य खडकाची सच्छिद्रता १ ते ३ टक्क्यांपेक्षा जास्त नाही. ग्रॅनाईट किंवा बेसाल्टमधून पाणी झिरपणे कठीण असते. चिकण मातीच्या थरातून सहसा पाणी जिरत नाही. उलट, वालूका स्थर किंवा लाईमस्टोन (चुनखडी) खडकातून पाणी मिळते. जमिनीखाली काही विशिष्ट खोलीवर सर्व प्रकारच्या सछिद्र भेगांनी युक्त खडक असतात. ते भूजलाने ओतप्रोत असतात. या अंतरभौम जलपातळीत भूजल पृष्ठ म्हणतात. देशपांडे नोंदवतात महाराष्ट्रातील विहीरींचे प्राकृतिक स्वरूप केवळ भूपृष्ठ रचनेमुळे निश्‍चित झाले नसून भूमीगत पाण्याचाही बराच प्रभाव आहे. राज्याच्या जलसिंचनाच्या एकूण गरजेपैकी ५० टक्के गरज विहीरी भागवतात. असे असूनही आतातपर्यंत भूमिगत जलपातळीबाबत राज्यात नगण्य संशोधन व्हावे ही आश्‍चर्यकारक वस्तूस्थिती आहे. आज या क्षेत्रात जाणीपूर्वक लक्ष दिले जात आहे. नवीन तंत्रज्ञानाआधारे भूजलाचा शोध घेणे शक्य झाले आहे.

शिवाय वैज्ञानिक दृष्टीकोनातून एखाद्या भूभागाची पाहाणी करून पुनर्भरणाचा विचारही केला जावू शकतो. तथापि मध्ययुग व त्याहीआधी जो भाग सदैव भूजलाने ओतप्रोत भरलेला होता त्याचा अचूक शोध घेण्यात आला. यासाठी परंपरेने व सातत्याने केलेल्या परिसराच्या निरीक्षणाचा फायदा त्यांना झाला. पारंपारिक, अनुभवजन्य शहाणपण अशी याची नोंद केली जावू शकते. भारताच्या विविध भागाचे भूस्थर रचना समजावून घेतांना त्या त्या क्षेत्रात असलेले नैसर्गिक वैशिष्ट्ये लक्षात घेतली गेली, शिवाय सिंधू, सरस्वती नदीचे खोरे, ब्रम्हपुत्रा, गंगा, नर्मदा, गोदावरी, कावेरी या व अशा प्रत्येक नदीखोर्‍याची स्वत: ची अशी वैशिष्ट्ये होती. महाकाव्यातून व पौराणिक ग्रंथातून त्यांची नोंद केली आहे. अशी नोंद करतांना स्थल महात्म्य, लोकस्मृती, परंपरा यांचाही विचार केला गेला. व त्या त्या क्षेत्रांचे वैशिष्ट्य लक्षात घेवून जागा नागरिकांसाठी किंवा मानवी वसाहतीसाठी उपयुक्त असणार्‍या भूमीअंतर्गत जलस्त्रोतांचा शोध घेण्यात आला, यानंतर त्या क्षेत्रात निर्माण करण्यात आलेल्या वास्तूंची प्रदेशनिहाय अशी वेगळी वैशिष्ट्ये पहावयाला मिळतात. बर्‍याचदा मंदीर स्थापत्यामध्ये जसे वैविध्य आढळते, तसेच वैविध्य जलव्यवस्थापनाच्या क्षेत्रात जाणवते.

दक्षिणेतील द्रवीड स्थापत्य शैली, उत्तरेतील नागरशैली किंवा गोदावरी खोर्‍यात आढळणारे भूमीज व वेसर (खेचर) स्थापत्यांचा प्रभाव आपणाला त्या त्या क्षेत्रातील बारव स्थापत्यावर पडल्याचे आढळते. याशिवाय भौगोलिक वैशिष्ट्यांचा परिणाम म्हणून निर्माण होणारी लयन स्थापत्य (गुहाशिल्प) दुर्ग स्थापत्य व मंदीर स्थापत्य या प्रत्येक वास्तूंच्या मधला वेगळेपणा त्या परिसरातील जलव्यवस्थापन मध्येही आढळतो. रामायणासारख्या ग्रंथात दैवमातृक आणि नदीमातृक शेतींचा उल्लेख येतो. पावसाच्या पाण्यावर भिजणारी जमीन ही देवमातृक मानली गेली. तथापि यापेक्षा वेगळ्या पध्दतीने मानवाने शेती करून पिक पध्दती विसकित केली. त्यासाठी नदी, विहीरी, जलाशय, कालवे यासारख्या पाणी व्यवस्थापन पध्दतीचा आधार घेतला. त्याला अदेवमातृक किंवा नदीमातृकम्हटले गेले आहे.

ज्या ठिकाणी नदीच्या काठावर किंवा तिच्या उपनद्यांच्या काठावर एका मर्यादित प्रमाणात मानवी वसाहत होती, तेव्हा प्रारंभिक काळात विहीरींची आवश्यकता नव्हती. पण ज्यावेळी निसर्गत: सहज उपलब्ध असणार्‍या जलप्रवाहाच्या पलीकडील क्षेत्रात वसाहतीकरणाची गरज माणसाला वाटली तेव्हा भूमीअंतर्गत असलेल्या भूगर्भजलाचा शोध घेतला गेला. व त्यातून विहीर, वापी, बारव या जलस्थापत्य प्रकाराचा विकास झाला. त्यामुळे माणसांना वेगवेगळ्या क्षेत्रात वसाहती करणे शक्य झाले.

वास्तविक पाहाता बारव निर्मितीच्या मागे असलेली प्रेरणा ही मानवी वसाहतीची गरज हीच होती. विहीरींच्या विविध आकार - प्रकारांचे व तिच्या शुशोभिकरणाचे प्रयोग करताना त्या त्या स्थानाचे भौगोलिक वैशिष्ट्य, पाण्याचे पावित्र्य, शुध्दता जपण्याचा केलेला प्रयोग आपण या अशा वास्तूत जपण्याचा केलेला प्रयोग आपण या अशा वास्तूत असलेल्या वैशिष्ट्यपूर्ण देवतांच्या मधून अनुभवी शकतो.

यासाठी म्हणून विविध कथानकांची व परंपरांची निर्मिती ही झाली. याची नोंद मध्ययुगीन साहित्यात पाहावयास मिळते. महानुभाव पंथ संस्थापक चक्रधर स्वामी, श्री ज्ञानदेव किंवा संत रामदास यांच्या दासबोध या ग्रंथात याविषयीचे उल्लेख पाहावयास मिळतात.

प्रत्येक स्थानावर असलेल्या वास्तूची वैशिष्ट्य व त्या त्या काळामध्ये जाणीवपूर्वक, विकसित झालेल्या जल व्यवस्थापनाच्या वैशिष्ट्यांचा परिचय करून घेणे ज्ञानवर्धक व रंजक ठरते.

श्री. अरूणचंद्र शं. पाठक - मो : ९६१९०४६०६९





 बारव (पाय विहीर) ,Vihir





etvbharat.com

Historical Place Amravati :






 










 

 प्राचीन मंदिरे बारवांत दिवे लागले रे



कोरोनाची मळभ अजून दाटलेले आहे. आणि अशा वातावरणांत औरंगाबाद परभणी येथील प्राचीन बारवांत मंदिरांत शिवरात्रीला दिपोत्सव साजरा झाला हे विशेष. दु:ख दळून खाणारी माणसं असे वर्णन खेड्यांतल्या माणसांचे करण्यात येते. या माणसांनी कोरोनाच्या अंधारावर मात करून दिवे लावले आहेत. 

परभणी जिल्ह्यात गेले दोन वर्ष प्राचीन वारश्याबाबत जागृती अभियान राबवले जात आहे. विविध गावांतील प्राचीन मंदिरे, मूर्ती, नदीचे घाट, समाधीस्थळे, बारवा यांचा शोध घेतला जातो आहे. त्या बाबत माहिती गोळा केली जाते आहे. जिल्हाधिकार्‍यांनी एक समिती तयार केली असून त्यांच्या वतीने जानेवारी महिन्यांपासून अशा प्राचीन वारसा असलेल्या स्थळांचे सर्वेक्षण दौरे केले जात आहेत. एक दोन नव्हे तर तब्बल 50 गावं अशी सापडली आहेत की जिथे प्राचीन वारसा स्थळं आहेत. 

11 तारखेला शिवरात्रीच्या दिवशी परभणी जिल्ह्यातील हातनुर, रायपुर, चारठाणा, पिंगळी,  ढेंगळी पिंपळगांव आणि धारासुर या गावांत गावकर्‍यांनी दिपोत्सव साजरा केला. प्राचीन बारवा साफ केल्या. जून्या मंदिरांची स्वच्छता केली. हातनुर गावचा आदर्श समोर ठेवून रायपुर येथील ग्रामस्थांनी आपल्या बारवेची दुरूस्ती केली. त्यासाठी स्वेच्छा वर्गणी गोळा केली. शिवरात्रीला ही बारव दिव्यांनी सजवली गेली होती. 

परभणी नांदेड रेल्वे मार्गावर पिंगळी रेल्वेस्टेशन आहे. या गावांतील बारव आणि तिच्या काठावर पिंगळेश्वर महादेवाचे प्राचीन मंदिर आहे. ही बारव भव्य आणि मोठी देखणी आहे. गावकर्‍यांनी या बारवेची साफसफाई करून इथे दिवे लावले.  धारासुर, ढेंगळी पिंपळगांव आणि चारठाणा येथील मंदिरांची साफसफाई आणि सजावट गावकर्‍यांनी केली. या मंदिरांवरही शिवरात्रीला दिवे लावण्यात आले. 

औरंगाबाद जिल्ह्यात पैठण तालूक्यात शेकटा या गावी एक मोठी बारव आहे. या बारवेची पाहणी जानेवारी महिन्यात व्हिन्सेंट या फ्रेंच मित्राला घेवून आम्ही केली होती. गावातल्या तरूण मुलांना एकत्र केले. बारवेची अवस्था अतिशय वाईट होती. किमान इथे स्वच्छता तरी करा असे आवाहन केले. त्या तरूणांनी हा विषय मनावर घेतला. शिवरात्रीच्या पार्श्वभूमीवर तेथे स्वच्छता अभियान राबविले गेले. त्या तरूण मुलांनी मला फोन करून सगळा वृत्तांत कथन केला. फोटो पाठवले. शिवरात्रीला तेथे मोठा दिपोत्सव गावातील महिलांनी साजरा केला. 

हाच उत्साह गावागावांत पसरण्याची गरज आहे. परभणी जिल्ह्यांत ज्या प्रमाणे उत्स्फूर्तपणे जनसामान्यांनी ही चळवळ पुढाकार घेवून चालवली आहे तशी ती इतरत्र चालली पाहिजे. नसता केवळ सरकारी पातळीवर किंवा एनजीओ पद्धतीने झाल्यास त्यातला उत्साह संपून जातो. केवळ कर्मकांड शिल्लक राहते. कितीही टिका केली तरी मंदिर संस्कृती हजारो वर्षे आपण टिकवून ठेवली आहे. तेंव्हा ही प्राचीन स्थळेही त्याच भावनेने जपली गेली तरच ती टिकतील. पौर्णिमा, शिवरात्र, जत्रा, उत्सव अशा निमित्ताने यांची देखभाल स्वच्छता झाली पाहिजे. या सण समारंभांवर पुरोगामी बनून टिका करण्यात काहीच अर्थ नाही. गुढी पाडवा, पौर्णिमेच्या निमित्ताने का होईना पण बारवेत दिवे लागत असतील तर ती चांगलीच गोष्ट आहे. गुढी पाडवा साजरा कशाला करायचा? असले मुर्खतापूर्ण प्रश्‍न विचारण्याचे इथे काहीच औचित्य नाही. 

हीच बाब प्राचीन मंदिरे, मुर्ती, शिलालेख यांच्या बाबत आहे. याचा काय उपयोग? आम्ही हे सगळेच नाकारत आलो आहोत असा दृष्टीकोन ठेवता येणार नाही. आपला प्राचीन वारसा जपणे याला कर्मकांड म्हणत नाहीत.  परदेशांत विशेषत: युरोपात प्राचीन वास्तुंबाबत अतिशय काळजीपूर्वक धोरण आखले जाते. त्यांचे जिवापाड जतन केले जाते. आणि या साठी केवळ सरकारवर अवलंबून राहिले जात नाही. स्वयंस्फुर्तपणे लोक पुढे येतात. देगण्या गोळा होतात. स्वयंसेवी संस्था पुढे येतात. आपल्याकडे नेमके याच्या उलट सगळं काही सरकारने करावं अशी अपेक्षा ठेवून आपण हातावर हात ठेवून बसून राहतो. केवळ हातावर हात ठेवून लोक शांत बसून आहेत असंही असलं असतं तर चाललं असतं. पण आपण प्राचीन वारसा खराब करतो. तिथले दगड चोरून नेतो. जून्या बारवांत कचरा टाकतो. त्यांना बूजवून टाकतो. ही नेतकी काय वृत्ती आहे? जून्या दगडी मंदिरला वार्निश फासून काय मिळते? जून्या वीरगळी, शिलालेख, सतीच्या शीळा धुण्याच्या कामासाठी वापरल्या जातात. ही भयानक अनास्था काय दर्शवते? 

13 एप्रिलला गुढी पाडवा आहे. या दिवशी महाराष्ट्रातील बहुतांश बारवा साफ होतील. त्यातील गाळ काढला जाईल. दुरूस्ती होईल आणि तिथे दिवे लागतील यासाठी आपण प्रयास करूया. परभणीने आदर्श समोर ठेवला आहे. औरंगाबादने त्यापासून प्रेरणा घेतली आहे. सारा महाराष्ट्र याच वाटेने जाईल अशी आशा करू या.    

 




 



रोहन काळे मंुंंबई- 9372496819  

(हतनूर संपर्क श्री गांधी काकडे 9767248427 बाळासाहेब शेळके 9922439645)

 
 



महाराष्ट्रांतील बारवांची मोहिम चालविणार्‍या रोहन काळे या तरुणाने शहरांतील एक दोन नव्हे तर 18 बारवांची नोंद जी.पी.एस. लोकेशन सह महाराष्ट्राच्या नकाशावर केली आहे. त्यांची यादी आणि त्यांचे लोकेशन खालील तक्त्यात दिले आहेत. आपण या बारवां नकाशावर जरूर शोधा. - समोर मॅपवरील क्रमांक दिला आहे. शिवाय जीपीएस कोऑर्डिनेटही दिले आहेत. या आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून महाराष्ट्रातील तब्बल 1500 बारवा नकाशावर आल्या आहेत. यातील 10 बारवांना महाराष्ट्र पर्यटन नकाशावर पर्यटन महामंडळाने स्थानही दिले आहे.

 

(पुरक संदर्भ : महराष्ट्रातील बारव स्थापत्य आणि परंपरिक जलव्यवस्थापन, लेखक अरूणचंद्र पाठक, अपरांत प्रकाशन)

(बारवेंचे नकाशावरील स्थान निश्चिती संदर्भ रोहन काळे.)
(फोटो सौजन्य व्हिन्सेंट पास्किनली)
















Reference:-








 

Baravs – Punyache Paani


Introduction

Pune has witnessed the construction of several aqueducts, cisterns, ornamental pools, ponds, and tanks throughout history, similar to many other places in India. Many of these water structures represent the traditional wisdom and efficient water management practices of our ancestors.

This photo essay narrates the story of one such traditional water structure known as barav, which is a stepped pond or a well. A typical barav consists of a shaft penetrating deep inside the earth to tap groundwater. A steep flight of steps surrounds the shaft, providing access to the people for fetching groundwater. Baravs may be square, rectangular, or octagonal in shape with a parapet wall along their perimeter. One or more pavilions known as mandaps are sometimes present along the sides of the baravs. The name ‘barav’ comes from a traditional unit of measurement called ‘bav’, equivalent to 1.5 metres. Additionally, baravs are also known by the names kundjalmandavi, and pushkarini.

The religious idea of attaining spiritual merit by performing acts of charity motivated many rulers, traders, money lenders, and priests to patronize the construction of baravs for the common good of the society at different places in Maharashtra. They were built with the financial support of the patrons, but were owned and maintained by the entire community, often transcending the social divides, as understood from the ancient stone inscriptions that exist near them. They were not only utilitarian structures, but also meeting places for people, especially women fetching their daily water, as well as sacred structures for holy bathing as part of religious rituals.

Sketch explaining the structure of a typical barav.


 
 

सामाजिक, सांस्कृतिक 'बारव'

टीम मटा ऑनलाइन

-श्रीकांत उमरीकर

बारव, म्हणजेच पायऱ्या असलेली विहीर. आपण ‘बारव’ या नावाने ओळखत असलो, तरी याचे भरपूर प्रकार आहेत. पायऱ्यांची विहीर या बोली भाषेतील शब्दांत बारवेची नेमकी व्याख्या आली आहे. इतर विहिरींतून पाणी उपसण्यासाठी पोहऱ्याचा वापर करावा लागतो किंवा मुळात या विहिरींचा उद्देशच पाणी उपसून त्याचा शेतीसाठी किंवा पिण्यासाठी उपयोग करणे, असा असतो.

बारवेच्या बाबतीत मात्र, पाणी मोटेने उपसणे हा मूळ हेतू नाही. बारव ही त्या प्रदेशांतील जलव्यवस्थापनाचे केंद्र असते. बारवेच्या जवळपास उंचीवर एखादा तलाव, पाणीसाठा, नदी असते. त्या पाण्याचे जमिनीखालचे प्रवाह शोधून, त्याच्या नेमक्या बिंदूवर बारव बांधली जाते. पायऱ्या असल्याने तिचा उद्देश पाणी प्रत्यक्ष घागरीने, म्हणजेच हाताने घेणे, असा असतो. मंदिर परिसरांत बांधलेल्या बारवांना कुंड, तीर्थ, कल्लोळ अशी नावे असतात. कंकालेश्वर (बीड) येथील मंदिर एका सुंदर अशा बांधीव कुंडातच आहे. मादळमोळी (जि. बीड) येथील बारव चारही बाजूने सुंदर अशा बांधीव ओवऱ्या असलेली आहे. या बारवेतच मंदिर आहे. आळंद (ता. फुलंब्री, जि. छत्रपती संभाजीनगर) येथील बारवेत आसरा मातेचे मंदिर आहे. चारठाणा (ता. जिंतूर, जि. परभणी) येथील पुष्करणी बारव चारही बाजूने ओवऱ्यांचे बांधकाम केलेली, विस्तीर्ण आहे. विस्तीर्ण बारवांना पुष्करणी म्हणतात. कंधार येथे अतिशय विस्तीर्ण तलाव आहे. त्याला ‘जगत्तुंग समुद्र’ असे नाव दिले आहे. अहिल्याबाईंच्या काळात प्राचीन मंदिरांचे, बारवांचे, नदीच्या घाटांचे जीर्णोद्धार मोठ्या प्रमाणात करण्यात आले. नवीन बांधकामे झाली. यामागे त्यांचे विलक्षण राजकीय, सामाजिक धोरण होते. याला धार्मिक समजण्याची चूक आपण नेहमीच करतो. ज्या मंदिरांत नियमित पूजा होते, धर्मशाळांचा वापर होतो, नदींचे घाट चांगले आहेत, बारवा चांगल्या बांधल्या गेल्या आहेत, त्यांचा वापर होतो, तेथे शांतता प्रस्थापित होते, असा विलक्षण निष्कर्ष अहिल्याबाईंनी काढलेला दिसतो. सोबतच प्राचीन वास्तुकला, तिचे सौंदर्य हाही मोठा विचार या धोरणात आहे. प्रत्यक्ष सैन्यबळावर भर देण्यापेक्षा, या बाबींवर भर देऊन, संपूर्ण भारतभर त्यांनी प्राचीन वास्तूंच्या जिर्णोद्धाराबाबत एक धोरण प्रत्यक्ष राबवून दाखवले.

अहिल्याबाईंच्या आधीच्या काळातील बारवा चारही बाजूंनी ओवऱ्या असलेल्या, उतरत्या पायऱ्या असलेल्या आहेत. (उदा. पुष्करणी बारव चारठाणा, ता. जिंतूर जि. परभणी; मादळमोही ता. गेवराई, जि बीड) या बारवांमध्ये देवकोष्ठ आढळतात. त्यात अष्ट दिक्पाल, शेषशायी विष्णू, गणेश, सप्तमातृका किंवा आसरा आदी देवता आढळतात. त्यांची पूजा केली जाते. शेषशायी विष्णूच्या अतिशय सुंदर मूर्ती जुन्या बारवांमध्ये दिसतात. यातील अप्रतिम शिल्पसौंदर्य असलेल्या दोन मूर्ती आजही मराठवाड्यात आहेत. एक मूर्ती परभणीच्या टाकळकर राममंदिरात (गांधीपार्क) आहे, तर दुसरी पैठणला जुन्या नाथ मंदिराजवळच्या नृसिंह मंदिरात आहे. या मूर्ती बारवांतील असल्याचे तज्ज्ञ सांगतात. अष्ट दिक्पाल, म्हणजेच आठ दिशांच्या देवतांच्या मूर्ती. या शेषशायी विष्णू मूर्तीच्या प्रभावळीत दिसतात. यांच्या स्वतंत्र मूर्तीही असायच्या. वालूर (ता. सेलू, जि. परभणी) येथे वर्तुळाकार, आठ दिशांनी आठ पायऱ्या उतरत गेलेली (हेलिकल) बारव कचरा काढल्यावर समोर आली. तिला आठ देव कोष्ठ आहेत. ६४ योगिनींच्या मूर्ती असलेली खांबपिंपरी (ता. शेवगांव, जि. अहमदनगर) येथील बारव तर अतिशय महत्त्वाचा असा ऐतिहासिक ठेवा पोटात बाळगून आहे. संपूर्ण भारतभर ६४ योगिनींच्या मूर्ती या शिवाय फक्त दोनच ठिकाणी आहेत. ही बारव पुरातत्त्व विभागाने अधिगहीत करण्याची कारवाई सुरू केली आहे.

अहिल्याबाईंच्या काळानंतर बारवांची रचना जराशी बदलत गेलेली दिसते. वेरूळची, अहिल्याबाईंच्या काळातील बारव ‘शिवतीर्थ’ नावाने ओळखली जाते. ती अतिशय देखणी आहे. या बारवेत आठ छोटी मंदिरे आहेत. जुन्या बारवांमध्ये देवकोष्ठ असत, त्याऐवजी येथे मोठ्या खोल्या अथवा दालने दिसतात. त्यांचा उपयोग स्त्रियांना कपडे बदलण्यासाठी करता यायचा. आजही ही दालने वापरली जातात. अहिल्याबाईंच्या काळातील किंवा त्या नंतरच्या बारवांत मात्र अशी रचना नाही. या बारवा भक्कम दगडी बांधणीच्या असून, त्यांत उतरण्यासाठी एका बाजूने पायऱ्या खोदलेल्या असतात. बाकीच्या बाजू भक्कमपणे दगडी चिऱ्यांत बंदिस्त असतात. चोंडाळा (ता. पैठण, जि. औरंगाबाद) येथील बारव होळकर संस्थानचे दिवाण चंद्रचूड जहागीरदार (न्या. चंद्रचूड यांचे घराणे) यांनी बांधलेली असून, ती अशा पद्धतीच्या बारब बांधकामाचा उत्कृष्ठ नमुना आहे. या बारवांत एका बाजूला पाणी उपसण्यासाठी मोट लावण्याची सोय आहे. त्याला ग्रामीण भागात बगाड म्हणतात. ही बगाड कमानींच्या रूपात अतिशय देखणी केलेली असते.

प्राचीन मंदिरांच्या परिसरांत बारवा आढळतातच. त्यातही नृसिंहासारखे उग्र देवतेचे मंदिर असेल, तर जवळ पाणी, नदीचा काठ किंवा कुंड असते. परभणी जिल्ह्यातच पोखर्णी येथे नृसिंह मंदिर आहे. गावाचे नावच पोखर्णी नृसिंह असे आहे. हे मंदिर आता आधुनिक झाले आहे. प्राचीन मंदिराचे काही अवशेष आता नाहीत; पण मंदिराला लागून उतरत्या पायऱ्यांची जुनी भव्य बारव आहे; ती आजही वापरली जाते. पाण्याचा उपसा नियमित केला जातो. बारवांतील पाण्याचा उपसा नियमित झाला, तर त्या चांगल्या राहतात. सोबतच भोवतालच्या आडांनाही पाणी राहते.

महाराष्ट्रात नोंद घेतल्या गेलेल्या, नकाशावर स्थान निश्‍चिती झालेल्या दोन हजार बारवा आहेत. रोहन काळे या तरुणाने राज्यभर फिरून बारवांच्या नकाशीकरणाचे फार मोलाचे काम केले आहे. ‘महाराष्ट्र बारव मोहीम’ ग्रामीण भागातील निष्ठावान कार्यकर्त्यांच्या बळावर चालवली जात आहे. या मोहिमेत नोंदवल्या गेलेल्या बारवांपैकी जवळपास १०० बारवा वास्तुशास्त्र, रचना, सौंदर्य उपयुक्तता या सर्वच अर्थाने पर्यटन स्थळ बनू शकतील. या बारवांचे पाणी पिण्यासाठी वापरता येऊ शकेल, इतके चांगले आहे. ग्रामीण भागात पिण्याचे पाणी ही मोठी समस्या असते, या पाण्याचा उपसा झाल्यास हा प्रश्न सुटण्यास मदत होऊ शकते. यातील ७५ बारवा ‘आझादी का अमृत महोत्सव’ अंतर्गत निवडण्यात येणार असून, सर्वच परिसर विकसित करण्याची योजना आहे. प्राचीन बारवा मंदिर परिसरात असतील, तर तो परिसर या निमित्ताने स्वच्छ होऊ शकतो. तेथे बाग फुलवली, तर त्याचा उपयोग लहान-थोरांना होऊ शकतो. याच पाण्याचा वापर करून, परिसरात मोठी झाडेही वाढवता येऊ शकतात.

पश्चिम महाराष्ट्रात बारा मोटेची विहीर (जि. सातारा) किंवा करमाळ्याची कमलाभवानी मंदिराजवळची, ‘सैराट’ या चित्रपटामुळे गाजलेली अष्टकोनी विहीर यांसारख्या देखण्या बारवा आहेत. काही इतक्या छोट्या आहेत, की त्या आकारानेच त्यांचे देखणेपण अजून खुलून येते. औरंगाबाद तालुक्यात शेंदूरवादा येथे खाम नदीच्या काठावर सिंधुरवदन गणेशाचे छोटे मंदिर आहे. या मंदिराच्या अंगणात अतिशय छोटी; पण देखणी बारव आहे. तिला चारही बाजूने पायऱ्या आहेत. ती नदीच्या काठावर आहे. पूजेसाठी या बारवेतून पाणी घेतले जायचे. नदीला पूर आला, की बारव बुडते; एवढेच काय मंदिरही पाण्याखाली जाते. आजही ही बारव दिमाखात उभी आहे.

बारव हे केवळ दगडी बांधकाम नाही, की धार्मिक ठिकाणही नाही. ते संपन्न संस्कृतीचे प्रतीक आहे. बारवांचे जतन व संवर्धनासाठी विविध उपयांची गरज आहे. शिवरात्र, चैत्री पाडवा या निमित्ताने या बारवांवर दीपपोत्सव करण्याची प्रथा काही ठिकाणी आहे. ती सर्वत्र होण्याची गरज आहे. लोककला, शास्त्रीय संगीत, नृत्य आदी कार्यक्रम बारवांच्या परिसरात आयोजित करायला हवेत. बारवांचा अभ्यास अभियांत्रिकी, वास्तुशास्त्र, शिल्पशास्त्र; तसेच सांस्कृतिक अंगाने झाला पाहिजे. बारवांच्या बांधकामांत सौंदर्य, उपयुक्तता, पाण्याची गरज, धार्मिक भावना असा सर्वांगीण विचार केला गेला आहे. पर्यटनाच्या दृष्टीनेही बारवांचा विचार व्हायला हवा.


प्राचिन जलव्यवस्थापन तंत्र – मंगल देशा, पवित्र देशा, मंदिरांच्या देशा



मानवी वसाहतीसाठी पाणी हे अतिशय महत्वपूर्ण घटक आहे. सिंधू संस्कृती ही नदीकाठी विकसित झाली होती. सिंधू संस्कृतीतील उत्खननांमध्ये अनेक विहीरींचे अवशेष सापडलेले अहेत. प्रत्येक गावात तीन-चार घरांमध्ये एक विहीर असल्याचे दिसून येते. नंतरच्या काळात स्थापन झालेली मोठी मानवी वसाहत ही महाजनपद काळात दिसून येते. या काळात वस्ती मोठ्या प्रमाणात नद्यांच्या काठावर दिसून येते. महाराष्ट्रात या काळातील मोठ्या वसाहतींचा विचार करता गोदावरी काठावर नाशिक, पैठण आणि बोधन; तेरणा काठी तेर; कुकडी काठी जुन्नर; केलना काठी भोकरदन; वैनगंगा काठावर पौनी; उल्हास नदीकाठी कल्याण या ठिकाणी सातवाहन कालिन वस्ती दिसून येते. पुढील काळात मानवी वस्ती इतर ठिकाणी स्थलांतरीत होण्यास सुरूवात झाली. वाढलेल्या मानवी वस्तीसाठी पाण्याची व्यवस्था करण्यासाठी नदीचे काठ अपुरे पडू लागल्यानंतर पर्यायी मार्गांचा शोध सुरू झाला. आणि यातूनच निर्मिती झाली भुगर्भातील पाण्याचा वापर करण्यासाठी विहीरी आणि बारव निर्मितीची. राष्ट्रकूट काळात महाराष्ट्राच्या विविध भागांत अशा बारवांची निर्मिती सुरू झाली. आणि पुढील चालुक्य, यादव आणि विजयनगर काळात मोठ्या प्रमाणात बारवांची निर्मिती करण्यात आली.

नद्यांच्या काठावरील घाट

नद्यांच्या काठावर राहणार्‍या लोकांना पाण्याची व्यवस्था या नद्यांच्या पात्रातून होत असे. मात्र नद्यांचे खोल पात्र आणि पाण्याचा वाहता प्रवाह यामुळे नद्यांचे पाणी वापरणे त्याकाळी नक्कीच धोक्याचे होत असेल. यामुळे ज्या ठिकाणी नदीचा काठ थोडासा उथळ असेल त्याठिकाणी नदीचे पाणी वापरायला घेण्यासाठी दगडी बांधकाम करून घाट निर्माण करण्याची पद्धत सुरू झाली. नदीच्या काठावर मोठमोठ्या आणि उंचीला लहान अश्या पायर्‍या बांधून नदीच्या पाण्यात उतरण्याची व्यवस्था या घाटांद्वारे करण्यात आलेली आहे. घाट शब्दाची निर्मिती ही संस्कृतमधिल घट्ट या शब्दापासून झाली आहे. उताराची जागा असा घट्ट शब्दाचा अर्थ आहे. नदीकिनार्‍यावर उताराच्या जागी असे घाट बांधले जात असत. डोंगराच्या उताराच्या जागांवर वाहतुकीसाठी निर्माण केलेल्या मार्गांना देखिल घाट हा शब्द याच अर्थाने वापरला जात असावा.

घाट बांधण्याची पद्धत नेमकी कधी सुरू झाली याचा काहीही ठोस असा पुरावा नाही. मात्र सातवाहन काळात नदीकाठी असे घाट निर्माण करण्याची पद्धत सुरू झाली असावी असे वाटते. तेलंगानामध्ये नागार्जुनकोंडा येथे कृष्णा नदीच्या काठावर काही घाटांचे अवशेष सापडले आहेत. त्याचप्रमाणे महाराष्ट्रात नेवासे येथे प्रवरा नदीच्या काठावर आणि त्र्यंबकेश्वर, नाशिक आणि पैठण येथे गोदावरी नदीच्या काठावर घाटांचे अवशेष सापडलेले आहेत. तेर येथील उत्खननांमध्ये नदीकाठी काही बांधकामांच्या पायाचे अवशेष सापडले आहेत. मात्र हे बांधकाम घाटांचे होते अथवा वस्तीच्या संरक्षक भिंतीचे हे लक्षात येत नाही.

आजच्या काळात महाराष्ट्रात आणि इतर राज्यांत मोठ्या प्रमाणात असे घाट दिसून येतात. महाराष्ट्र, मध्य प्रदेश आणि उत्तर प्रदेशमधिल बरेच घाट हे पेशवेकाळात आणि इंदूरच्या अहिल्यादेवी होळकर यांच्या काळात बांधलेले आहेत. कदाचित याठिकाणी पुर्वी असलेल्या घाटांचा जिर्णोद्धार करून त्यांनी नवे घाट बांधले असावे. मात्र असे पुरावे शिलालेखांत अथवा लिखाणात सापडत नाहीत. त्यामुळे खात्रीने सांगता येत नाही. पाण्यासाठी बांधलेल्या या घाटांसोबतच कित्येक ठिकाणी अंतिम संस्कार करण्यासाठी वेगळे घाट देखिल बांधण्यात आलेले आहेत. काशीचे मणिकर्णिका घाट हे असेच अंतिम संस्कारासाठी बनलेले घाट आहे. ज्या गावात नदी नाही अशा ठिकाणी अंतिम संस्कारात गावातच एखाद्या ठराविक जागी होतात. मात्र या जागांना “स्मशान घाट” म्हणण्याची पद्धत आजही आहे.

बारव / कुंड

जसजसे मानवी वस्ती नदीपासून दुरच्या ठिकाणी वसविली जाऊ लागली, तशी पाण्याची गरज भागविण्यासाठी इतर पर्यायांचा विचार केला जाऊ लागला. भुगर्भातील पाण्याच्या वापरासाठी विहिरी बांधण्याची पद्धत पुर्वी सिंधू संस्कृतीमध्ये दिसून येते. याच विहिरींना नविन स्वरूपात निर्माण केले जाऊ लागले. हे नविन स्वरूप होते बारव अथवा कुंडांचे. बारवांचा आकार विहीरींपेक्षा खूप मोठा आणि पसरट असा होता. हे बारव जमिनीत अगदी १० ते १५ फुट पासून १५० – २०० फुट खोलीपर्यंत बांधले जात होते. कोकण भागात भौगोलिक रचनेमुळे पाणी साठवून ठेवणे कठीण आहे. त्यामुळे कोकण भागात असे बारव कमी प्रमाणात आढळतात. तर विदर्भात पावसाचे प्रमाण तुलनेने जास्त असल्याने त्या भागात नैसर्गिक जलाशये जास्त प्रमाणात आढळतात. मात्र कमी पर्जन्यमान असलेल्या मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रात बारव जास्त प्रमाणात आहेत. या बारवांचा उपयोग भुगर्भातील पाण्याचा वापर करणे आणि पावसाचे पाणी जमिनीत मुरवणे आणि साठवून ठेवणे यासाठी केला जात असे.


अंबेजोगाई (जि बीड) येथील एक बारव

बारवांची निर्मिती चालुक्य काळात आणि नंतर मोठ्या प्रमाणात झाली असली तरी त्यपुर्वीदेखिल बारवांचा वापर नक्कीच होत होता. तेर (जि धाराशिव) येथे इस १ ल्या शतकातील एक बारव सापडली आहे. मांढळ (जि नागपूर) येथे ४ थ्या शतकातील म्हणजे वाकाटककालिन बारव सापडली आहे. तर मानसपुरी (जि नांदेड) येथे एक राष्ट्रकुट काळातील बारव सापडली आहे. आज दिसणार्‍या बहुतांश बारव मात्र चालुक्य, यादव आणि विजयनगर काळातील आहेत.

या बारवांना पाण्यापर्यंत जाण्यासाठी पायर्‍यांची निर्मिती केली जात असे. काही ठिकाणी एका बाजुने, काही ठिकाणी दोन बाजुने तर काही ठिकाणी चारही बाजुंनी अश्या पायर्‍यांची सोय केलेली दिसून येते. बारवांची रचना, पायर्‍यांची व्यवस्था, आकार यांच्या आधारावर कुंड, विहीर, आड, कल्लोळ आणि बारव असे विभागीकरण करता येऊ शकते. विहीर गोल आकाराची आणि खोल असते. आड देखिल विहिरीप्रमाणेच मात्र कमी खोलीचे असतात. विहीर आणि आडामध्ये आत उतरण्यासाठी पायर्‍यांची सोय नसते. पाणी बाहेर काढण्यासाठी रहाटाचा वापर करण्यात येतो. कुंड हे पसरट आकाराचे, मात्र कमी खोलीचे असते. कुंडामध्ये उतरण्यासाठी चारही बाजुंनी पायर्‍यांची सोय दिसून येते. कल्लोळ हे देखिल कुंडाप्रमाणेच, मात्र आकारात लहान आणि मंदिराच्या आतमध्ये असते. तुळजापुर किंवा त्र्यंबकेश्वर येथे असे कल्लोळ दिसून येतात. बारव हे विहीर आणि कुंड या दोघांचे मिश्रण. आकाराने पसरट, खोलीला कुंडापेक्षा थोडे जास्त, आणि पाण्यापर्यंत जायला एक किंवा अधिक बाजुने पाय‍र्‍या अशी बारवेची संरचना असते. हे बारव वर्तुळाकार, चौरस, आयात, षटकोन, आष्टकोन अशा विविध आकारांमध्ये दिसून येतात.


सिद्देश्वर मंदिर, लातूर येथील बारव

बारव आणि कुंडांच्या ठिकाणी विविध देवतांच्या मुर्त्या देखिल दिसून येतात. कित्येक बारव हे मंदिराच्या परीसरात किंवा जवळपास असतात. पुर्वी असलेल्या मंदिराच्या जवळपास बारव बांधले गेले, किंवा बारव बांधल्यावर शेजारी मंदिराची निर्मिती केली गेली हे माहित नाही. मात्र मंदिर आणि बारव यांचा परस्पर संबंध मात्र जाणिवपुर्वक केला गेला असवा. बारवाची स्वच्छता आणि रखरखाव टिकवून ठेवण्यासाठी त्याला पवित्र्याची जोड देणे नक्कीच खूप सोयीचे होते. ज्याठिकाणी बारव मंदिर परीसरात नव्हती तेथे बारवांच्या पायर्‍यांच्या बाजूने अथवा भिंतींमध्ये देवकोष्ठ बांधून त्यामध्ये देवतांच्या मुर्त्या स्थापित केल्या गेल्या. आज यामधिल खूप कमी ठिकाणी मुर्त्या अस्तित्वात आहेत. आणि जेथे आहेत तेथे खूप भग्न अवस्थेत आहेत. काही बारवांच्या बाजूने मंडपांची रचनादेखिल आढळून येते. ही रचना कदाचित धार्मिक विधींसाठी असावी. किंवा बारवेमध्ये आंघोळ केल्यानंतर कपडे बदलण्याची जागा म्हणून या मंडपांचा वापर केला जात असण्याचीदेखिल शक्यता आहे.

लेण्यांच्या आसपास आणि किल्ल्यांवर जलव्यवस्थपनासाठी दगडी टाके देखिल खूप ठिकाणी दिसून येतात. खडकाला फोडून आतमध्ये पोकळ जागा तयार केली जात असे. आणि त्याचा वापर पाण्याचा साठ्यासाठी केला जात असेल. खडकांमध्ये असणारे झरे आणि पावसाचे पाणी अशा दोन स्त्रोतांद्वारे या टाक्यांमध्ये पाणीसाठा होत असे. कन्हेरी लेण्यांमध्ये सर्वात जुने टाके दिसून येतात. पुढील काळात कित्येक किल्ल्यांवर असे टाके बांधले गेले.

महाराष्ट्रमध्ये लहान मोठे मिळून किमात १५०० बारव अस्तित्वात असावेत. यांपैकी कित्येक बारव आज अतिशय भग्न अवस्थेत आहेत. बर्‍याच ठिकाणी हे बारव बुजून गेले आहेत किंवा बांधकामाठी बुजविण्यात आले आहेत. मात्र या बारवांना भग्नावस्थेतून काढून स्वच्छ केल्यास जलव्यवस्थापनासाठी त्यांचा खूप उत्तम प्रकारे वापर केला जाऊ शकतो. काही वर्षांत त्यादृष्टीने प्रयत्न सुरू झालेले आहेत. येणार्‍या काळात सर्वच गावांमध्ये लोकसहभागातून अशी कार्ये हाती घेतल्यास नक्कीच फायदा होणार आहे. गरज आहे ते लोकांना बारवांचे महत्व पटवून देण्याची आणि सकारात्मक बदल घडवून आणण्याची.

दै. पुढारी विशेष : बारवांचा महाराष्ट्र

अंजली राऊत

नाशिक : सतीश डोंगरे

20 हजार बारवांचा शोध – ऐन लॉकडाऊनमध्ये (2020) महाराष्ट्रातील बारव शोधण्याची मोहीम सुरू केली. आतापर्यंत 1800 बारव शोधून त्या पुनर्जीवित करण्यासाठी पुढाकार घेतला आहे. महाराष्ट्रातील 20 हजार बारव शोधण्याचा ध्यास असून, त्या पद्धतीने काम सुरू आहे. – रोहन काळे, महाराष्ट्र बारव मोहीम.

नाशिकमध्ये 500 च्यावर बारव – शिवकार्य गडकोट संवर्धन संस्थेच्या माध्यमातून नाशिक जिल्ह्यातील कित्येक बारवांचा श्वास मोकळा केला आहे. नाशिक जिल्ह्यात पाचशेपेक्षा अधिक बारवांची संख्या असून, त्या शोधून त्यांचे पुनर्जीवन करण्यासाठी धडपड सुरू आहे. – राम खुर्दळ, अध्यक्ष, शिवकार्य गडकोट संवर्धन.









 
 
 

 खानदेशातील जलसंस्कृती

 खानदेशातील जलसंस्कृती

असिक, ऋषीक, स्कंधदेश, खांडवदेश, कान्हदेश, दानदेश, डांगदेश, तानदेश अशी कधीकाळी विविध नावे असलेला आणि ज्याचा विस्तार उत्तरेला सातपुडा, दक्षिणेस सातमाळा, चांदोर, अजिंठा डोंगररांगांपर्यंत, पूर्वेला हाती टेकड्या तर पश्चिमेस सह्याद्री डोंगररांगांपर्यंत असलेला हा खानदेश. वाघुर काठच्या अजिंठ्याच्या रॉबर्ट – पारो व डोंगरी-तित्तूर काठच्या चाळीसगावच्या केकी मूस यांची अजरामर प्रेम कहाणी देणारा खानदेश.
खानदेश हा १९०६ पूर्वी एकच जिल्हा होता पण प्रशासकीय सोयीसाठी नंतर त्याचे पूर्व खानदेश व पश्चिम खानदेश असे २ भाग करण्यात आले. १९६० साली पूर्व खानदेश हा जळगाव जिल्हा झाला, १९६१ मध्ये पश्चिम खानदेशचा धुळे जिल्हा झाला आणि पुढे १ जुलै १९९८ ला नंदुरबार हा स्वतंत्र जिल्हा झाल्यामुळे तेव्हापासून जळगाव, धुळे व नंदुरबार असे याचे आत्ताचे ३ जिल्ह्यांचे स्वरूप आले. अशा या खानदेशातील पुरातत्वीय कालखंड ते आधुनिक काळापर्यंतच्या जलसंस्कृतीचा मागोवा घेण्याचा प्रयत्न या लेखात केलेला आहे.
भारतीय संस्कृती हि पंचमहाभूतांना म्हणजेच जल, वायू, आकाश,पृथ्वी व अग्नी यांना महत्व देणारी संस्कृती आहे. याच संस्कृतीत आदिम कालखंडात म्हणजेच सिंधू संस्कृतीत देखील निसर्गदेवतांचीच पूजा व्हायची ज्यात प्रामुख्याने जलदेवतांची पूजा व्हायची असे अनेक पुरावे आता उपलब्ध झालेले आहेत. प्राचीन भारतीय साहित्यापैकी एक असलेल्या अथर्ववेदात उल्लेख येतो की – ज्याप्रमाणे गाई मागे वासरू त्याप्रमाणे नदी मागे कालवा आवश्यक आहे. तसेच ऋग्वेदातहि शेतीसाठी पाण्याचा वापर कसा करावा, पाणी उपसा कसा करावा याचे दाखले दिलेले आहेत.
खानदेशात उपलब्ध झालेल्या आत्तापर्यंतच्या सर्व पुरातत्वीय अवशेषांवरून तापी व गिरणा हे दोन खानदेशच्या जलसंस्कृतीचे मुख्य प्रवाह असून प्रकाशा, सावळदा, बहाळ-टेकवाडे, पाटणे-पाटणादेवी, चित्तेगाव-मानेगाव तसेच धुळे जिल्ह्यातील शेकडो पुरातत्वीय स्थळांवरून या प्रदेशातील जलसंस्कृतीची मुळे शोधणे शक्य झाले आहे. १९५२-५३ पासून डॉ. शंकर साळी, बी. के. थापर, बोपर्डीकर, डॉ. वसंत शिंदे या तज्ञ पुरातत्ववेत्त्यानी केलेल्या संशोधनांतून २०० पेक्षा जास्त अश्मयुगीन, १०० पेक्षा अधिक ताम्रपाषाण व जवळपास ५० उत्तर हरप्पा कालीन वसाहती खानदेशात होत्या हे उजेडात आले.१ यातून सर्वात मोठा पुरावा आपल्या हाती तो म्हणजे प्राचीन काळी मानवी वसाहती या जलसमृद्ध असलेल्या प्रदेशातच होत असत म्हणजेच खानदेशची भूमी हि खऱ्या अर्थाने जलसंपन्न होती. माझ्या अल्पमती ज्ञानानुसार जगाच्या पाठीवर कोणत्याही एका जिल्ह्यात इतकी पुरात्वीय स्थळे नाहीयेत जितकी एकट्या धुळे जिल्ह्यात आहेत.
खानदेशातील तापी आणि गोमई नदीच्या काठावर प्रकाशा येथे भारतातील पहिली शेती झाली तसेच डोंगरी नदीच्या काठावर पाटणे जेथे धवलतीर्थ सारखा अप्रतिम सुंदर असा जलप्रपात आहे (ता. चाळीसगाव) येथे प्रत्यक्ष वस्ती असलेले भारतातील सर्वात प्राचीन अश्मयुगीन वसाहत स्थळ १९७२ साली संशोधकांना प्राप्त झाले.२ याच पाटणे या ठिकाणी ४० ते ६० हजार वर्षा पूर्वीची शहामृगाच्या अंड्यावर केलेली कोरीव नक्षी, अंड्याचे मणी प्राप्त झाले जे मणी भारतातील दागिन्यांपैकी सर्वप्रथम होत.३ तसेच येथेच सापडलेले पाटा-वरवंटा व धान्याचे कण यावरून प्राचीन मानवाचा धान्य बारीक करून खाण्याचा प्रथम पुरावा म्हणता येईल. इ.स. पूर्व १८०० ते १६०० पूर्वीच्या उत्तर हडप्पा संस्कृतीच्या समकालीन असलेल्या मानवाने पाटणेच्या महादेव मंदिरा पासून जवळच असलेल्या आड नामक नाल्याकाठी एक गांव वसविले.
याच परिसरातील गिरणा-बहुळा नदीच्या काठावरील बहाळला सापडलेल्या आहत (पंचमार्क्ड) नाण्यांवरून या भागावर इ.स. पूर्व चौथे शतक ते दुसरे शतक या काळात मौर्यांचे राज्य होते. नंतर सातवाहन राजांच्या काळात उत्तरेकडून अंबा गाव व तेथून पितळखो-याच्या रस्त्यावर हंकारी नावाचे मातीचा कोट असलेले गाव वसविले होते. अजिंठ्यातील शिलालेखानुसार पुढे येथे वाकाटकानी येथे राज्य केले. यावरून एक निष्कर्ष काढता येतो तो म्हणजे इ.स. पूर्व दुसर्या शतकात ज्याची निर्मिती सुरु झाली त्या पितळखो-याच्या लेणी निर्मितीसाठी पाटणे हे एक मदत केंद्र नक्कीच ठरलेले असणार. पुरातत्ववेत्ते एम. एन. देशपांडे यांच्या मतानुसार पितळखो-याच्या जगप्रसिद्ध यक्षाचे नाव संकारी असल्यावरूनच येथील गावाला संकारी हे नाव दिले असावे. पिंपळनेरच्या ताम्रपटानुसार बदामीच्या चालुक्यांचीहि येथे सत्ता होती. पुढे अभीर, यादव यांनी येथे राज्य केले. पाटणादेवीच्या मंदिरातील इ.स. ११५३ व इ.स. १२०७ च्या शिलालेखानुसार हे स्थळ म्हणजे निकुंभ राजांनी आपली राजधानी बनविले होते. तेर, पैठण (तत्कालीन प्रतिष्ठान) ते सोपारा (कल्याण) या प्राचीन व्यापारी मार्गावरील पाटणे हे एक महत्वपूर्ण स्थळ होते.४ शासनाच्या एका ग्रंथ लेखनाच्या कामानिमित्त या सर्व परिसरातील मंदिरांचा जेव्हा आम्ही सर्वे केला त्या मंदिरांच्या शिल्प स्थापत्यांवरून तसेच उपलब्ध हस्तलिखित ग्रंथ५, शिलालेख – ताम्रपट यांच्या अभ्यासावरून हि नृत्य, संगीत, शिल्प या कलांचीही भूमी असल्याचे स्पष्ट होते.
याच पाटणादेवीच्या धवलतीर्थाच्या परिसरात १२ व्या शतकात गणित व ज्योतिष शास्त्राचा महान अभ्यासक भास्कराचार्य यांनी गणित लिलावती, लिलावती भाष्य, सिद्धांतसारशिरोमणी सारख्या ग्रंथांची रचना केली. आणि जवळच असलेल्या डोंगरी व तित्तूर च्या काठावर असलेली चाळीसगाव हि फोटोग्राफी व चित्रकलेचा ध्येयवेडा कलावंत केकी मूस यांची कर्मभूमी आहे. गंगा-यमुनेचे अप्रतिम शिल्प निर्माण करणाऱ्या या कलावंताचे जीवन म्हणजे हृदय पिळवटून टाकणारी प्रेमकहाणी आहे.
गिरणा नदीच्याच काठावर नुकतेच २०१७-१८ मध्ये प्रस्तुत लेखकाला प्राप्त झालेल्या अवशेषांवरून डेक्कन कॉलेज, पुणे येथील श्री. निलेश जाधव व इतर ४ संशोधकांच्या टीमने केलेल्या सर्व्हेनुसार हडप्पा संस्कृतीच्या समकालीन ३० लहान-मोठी वसाहत स्थळे प्राप्त झाली आहेत.६
उपरोक्त सर्व माहितीवरून हे सिद्ध होते की पूर्व खानदेशचे गिरणा-बहुळा-डोंगरी-तित्तूर नद्यांचे खोरे हा एक समृद्ध आर्थिकदृष्ट्या संपन्न जलसंस्कृतीचा प्रदेश होता.
पूर्व खानदेश व पश्चिम खानदेशला जोडणारा एक महत्वाचा दुवा म्हणजे तापी नदी. पश्चिमेकडून पूर्वेकडे वाहणाऱ्या या तापी नदीला खानदेशात लहान मोठया १३ नद्या व असंख्य ओढे मिळतात तसेच खानदेशचा बहुतांश भूभाग हा तापीच्या दक्षिणेला वसलेला आहे. नंदुरबार जिल्ह्याच्या एका टोकावरून नर्मदेचा प्रवाह खळाळतो तर मध्यातून तापी वाहते. या तापी-बोरी-बुराई नदीच्या काठांवर प्रकाशा-कवठे-मेथी-शिंदखेडे अशी असंख्य प्राचीन स्थळे वसलेली आहेत. या पैकी प्रकाशा-सावळदा हे भारतातील अत्यंत महत्वाचे पुर्तात्वीय स्थळ आहे कारण या ठिकाणी ४ विविध संस्कृतींचे असंख्य अवशेष प्राप्त झालेले आहेत. भारतात जेथे जेथे अत्यंत समृद्ध जलसंस्कृतीची स्थळे होती तेथेच कुंभमेळ्यांची परंपरा सुरुवात झाली व ती कायम राहिली. तापी नदीच्या काठावरील प्रकाश येथेही हि परंपरा कायम राहिलेली दिसते. ज्याप्रमाणे पश्चिम खानदेशात तापी-बोरी-बुराई नदीच्या काठांवर शेकडो पुरात्वीय स्थळे प्राप्त झालेली आहेत (विस्तार भयास्तव त्यांची अधिक माहिती येथे वगळलेली आहे) त्याच प्रमाणे पूर्व खानदेशातहि याच तापी-पूर्णेच्या संगमावर चांगदेव जवळ चितेगाव, मानेगाव येथे आद्य पुराश्मयुगीन वसाहतीचे दीड ते एक लाख वर्षा पूर्वीचे अवशेष प्राप्त झालेले आहेत.७
तापीचे मूळ नाव बदरी व पुर्णेचे पयोष्णी असे होते. या दोन्ही नद्यांच्या संगमाजवळच असलेल्या मेहूण या गावातील अभिलेखातून जळगाव जिल्ह्याचे वैशिष्ट्य म्हणता येईल अशी एक माहिती मिळते. चालुक्य विक्रमादित्याचा मांडलिक हैहय वंशीय (कलचुरी) राजा प्रतिकंट व त्याच्या मुलाचा शुभंकंटचा खानदेशातील एकमेव असे सूर्य मंदिर येथे उभारल्याच्या संदर्भात उल्लेख मेहूण अभिलेखात येतो. हे घराणेही रत्नपूरच्या कलचुरीप्रमाणेच सूर्यवंशीय होते. विशेष म्हणजे यातील प्रतिकंट या राजाचे ‘महाराष्ट्र’ हे व्यक्तिनाम. संपूर्ण महाराष्ट्रावर राज्य करणाऱ्या एकाही राजाचे ‘महाराष्ट्र’ नाव या व्यतिरिक्त दुसरे नव्हते हे येथे लक्षात घ्यावे. इ.स. ८०७ पासून हि सत्ता या तापीच्या खोऱ्यात नांदत होती. ८ अशा या २ संपन्न जलसंस्कृतीचा वारसा देणाऱ्या तापी व गिरणा यांचा संगम जळगाव व चोपडा तालुक्याच्या सीमेवर होतो.
आत्तापर्यंतच्या या प्राचीनतम संदर्भा बरोबरच मध्ययुगीन कालखंडातील खानदेशातील जलसंस्कृतीचे संदर्भ आपणाला प्राप्त होतात. भारतीय इतिहासात साधारणतः १२ वे शतक ते १८५७ पर्यंतचा काळ हा मध्ययुगीन काळ मानला जातो.

ज्ञानेश्वरीत उल्लेख आल्याप्रमाणे
शके बाराशे बारोत्तरे तै टिका केली ज्ञानेश्वरे | सच्चिदानंदबाबा अत्यादरे लेखकू जाहला ||
या प्रमाणे शके १२१२ मध्ये म्हणजेच इ.स. १२९० मध्ये ज्ञानेश्वरीचे लेखन पूर्ण झाले याच्याच अवघ्या काही वर्षानंतर खानदेशातील तापी नदीच्या या काठावरच मेहूण येथे हठयोगी वटेश्वर चांगदेवाची गुरु आद्य स्त्री साहित्यक संत, मुक्ताई समाधीस्थ झाली. नामदेव गाथेतहि येथीलच तापीकाठच्या सोमेश्वराचे वर्णन करणारे अभंग उपलब्ध आहेत. नाथपंथाच्या तत्वसार या महत्वपूर्ण ग्रंथाची निर्मितीहि इ.स. १३१२ मध्ये येथेच तापी तीरावर झाली.९
महानुभाव साहित्यातील इ.स. १४१८ मध्ये लिहिल्या गेलेल्या ‘ऋद्धिपूरवर्णन’ या महान काव्याचा रचियता नारायण बास – नारोबास हा बहुळा नदीच्या काठावर राहणारा असल्याने त्यांना बहाळीये हे संबोधन प्राप्त झाले.१० यातील एकूण ६४१ ओव्यांपैकी कांही ओव्यात बहुळा नदीकाठचे जनजीवनाचे सुंदर वर्णन कवीने केलेले आहे.
यावरून आपणाला असे म्हणता येईल की तापी-पूर्णा काठावरील हि सर्व स्थाने तत्कालीन कालखंडात ज्ञानसाधनेने संपन्न होती.
दुसरा फारुकी सुलतान नसीर खान (इ.स. १३९९-१४३७) याने असिरगडावरून हस्तगत केलेल्या संपत्तीतून तत्कालीन खानदेशच्या तापीकाठावर इ.स. १४०० मध्ये आपल्या राजधानीचे नवीन शहर बांधले व त्यास बुऱ्हाणपूर हे नाव दिले. या शहरात त्यावेळी २ लाख ३५ हजार व्यक्तींना पुरेल अशी १ कोटी लिटर पाणी मिळण्यासाठीची पाणीपुरवठा योजना पद्धती इ.स. १६१५ मध्ये अमलात आणली गेली. जी आजही कसलाही एक रुपये लाईट बिल खर्च न येता चालू आहे. (केवळ योग्य देखभाल न केल्यामुळे व पाण्यात मिठाचा गुणधर्म जास्त असल्यामुळे आता ३० लाख लिटर पाणी या पद्धतीतून होतो.)११
नंदुरबार जिल्ह्यातील पाण्याची उपलब्धी व जीवनमान याचे वर्णन करताना १३३५ ते १३६५ या कालखंडात खानदेशातून प्रवास करताना लिहितो – ‘इस छोटे से नगर के लोग कला-कौशल के द्वारा हि अपना निर्वाह करते है. इनमे से कोई कोई वैद्यक तथा ज्योतिष के भी अपूर्व ज्ञाता है. चावल, हरे शाक-पात और सरसों का तेल यहां के प्रधान खाद्यपदार्थ है. यहां मदिरापान दूषण समझा जाता है और कोई आदमी मद्यसेवन नही करता. १२
मध्ययुगाच्या उत्तरार्धात अबुल फझलच्या एन-इ-अकबरी (इ.स. १५७७) मध्ये, माझ्याकडे उपलब्ध असलेल्या तबकात-ए-अकबरी (इ.स. १५९३) या हस्तलिखित ग्रंथात,१३ तारीख-ए-दख्खन (इ.स. १७२९) या ग्रंथातहि येथील जलसंस्कृतीची वर्णने आढळतात.१४ समकालीन हिंदुस्थानात अतिपवित्र मानलेल्या २८ नद्यांमध्ये अबुल फझलने तापी नदीचा समावेश केलेला आहे. तो लिहितो – ‘तापी नदी वऱ्हाड गोंडवनच्या दरम्यान उगम पावुन खानदेशातून वाहते आणि पूर्णा व गिरणा या तिच्या उपनद्या आहेत. येथील हवामान सुखद व हिवाळा आल्हाददायक आहे. येथे ज्वारी हे मुख्य पीक असून कांही ठिकणी ते ३ वेळा काढले जाते. येथे उत्तम प्रतीचा तांदूळ होतो. फळफळावळ विपुल असून विड्याची पानेही भरपूर आहेत. येथे चांगल्या प्रतीचा कापड तयार होतो व धरणगावचा ‘सिरी साफ’ व ‘भिरीन’ हा कपडा प्रसिद्ध आहे. एदलाबाद हे देखील चांगले शहर असून त्या नजीकच्या तलावाचा जलसिंचनास्तव उपयोग होतो. चोपडा हे मोठे समृद्ध शहर असून डांभूर्णी गाव व जामोद परगणा सधन आहे.१५ या लिखाणातून देखील तापीकाठच्या संपन्न खानदेशी लोकवसाहतीचे संदर्भ समोर येतात.
खानदेशच्या जलसंस्कृती व तिच्या परिसरातील जनजीवनाची अशीच वर्णने आदिल खान फारुकीच्या गुलशन – इ – इब्राहीमी, १६५६ ते १७१७ पर्यंत खानदेशात अनेक वेळेला फिरलेल्या निकोलाय मनुची, ट्र̆व्हेनियर, टा̆मसरो, मा̆र्टीन, थेवेनॉट, बर्नियर व डेक्कन कॉलेज, पुणे येथील मराठा वस्तुसंग्रहालयात व पेशवे दफ्तर, पुणे येथे असलेल्या खानदेश जमाव रुमाल क्र. १२, ५७, ११३, ११५, ११८, १३३, १६८, १६९, १७०, १९९ व २१८ मध्ये येतात.
४ ते ७ ऑगस्ट १६८१ या ३ दिवसात पॉ͘डेचेरी येथील फ्रेंच्यांच्या वखारीचा प्रमुख प्रासोन्क्षा मार्टिन याने खानदेशातून प्रवास केला ज्याचे त्याने आपल्या डायरीत फ्रेंच भाषेत वर्णन करून ठेवलेले आहे. त्यात तो म्हणतो – ४ ऑगस्ट रोजी आम्ही फर्दापूर येथे पोहचलो. अजिंठ्याचा मैल – दीड मैल घाट उतरत असताना पाहणाऱ्याला भोवतालचे दृश्य इतके सुंदर वाटते की, त्याचे वर्णन शब्दात करणे शक्य नाही. या प्रदेशातील सर्व भाग अतिशय सुपीक आहे आणि जेथे पहाल तेथे जमीन शेतीखाली आलेली दिसते. डोंगरातून उगम पावलेल्या नद्या (वाघूर इ.) या प्रदेशातून वाहत जातात. ह्या प्रदेशात जिकडे-तिकडे आंब्याच्या बागा व चिंचेची झाडे दिसतात. पुढे तो शेंदुर्णी, गिरणा नदी व तिचा भोवताल, एरंडोल व धरणगावच्या संपन्नतेचे वर्णन करतो.१६ वाघूर नदीकाठच्या जगप्रसिद्ध अजिंठा लेणी परिसराचे हे पहिलेच यथार्थ वर्णन ठरते. आजही येथील सप्तकुंड धबधब्यातून पडणारा वाघूरचा विलोभनीय प्रपात पाहताना १३९ वेळा अजिंठ्याला भेट देऊनही रॉबर्ट-पारो च्या प्रेमकथे प्रमाणे माझेही मन अतृप्त राहिल्या सारखे वाटते. परंतु मनाला हि मोठी खंतहि राहून जाते की मागच्या ५० वर्षात या परिसरातीलच मानवाने आपल्या कर्माने या जगप्रसिद्ध जागतिक वारसाचे प्रचंड नुकसान करून ठेवलेले आहे जि हानी आता कधीच भरून येऊ शकणार नाही.
एकूणच मुघल व मराठा कालीन सर्व दस्ताऐवजांमध्ये तापी व गिरणाकाठची जळगाव व भुसावळ याचे उल्लेख वगळून अमळनेर, बहाळ, भडगाव, पाचोरा, शेंदुर्णी, लोहारा, एरंडोल, धरणगाव, अडावद, चोपडा, डांभूर्णी, नशिराबाद, यावल, सावदा, न्हावी, चांगदेव, वरणगाव, बोदवड, एदलाबाद, अंतुर्ली, रावेर, बहाद्दरपूर, जामनेर, वाघळी, जामोद, जैनाबाद, नंदुरबार, देवपूर, धुळे, कवठे, साक्री, दोंडाइचा इ. स्थानाचे उल्लेख तेथील वनस्पती, प्राणी, पिके व सुपीक जमिनी इ. सह येतात. पुणे पुराभिलेखागारातील पत्रांवरून आपणास खानदेशातील पेशवे काळातील पाणीपुरवठा केंद्रांची म्हणजेच धरणे वा बंधारा-यांची माहिती मिळते. या काळात नेर, डोंगरी, जापी, निमखेड, भवाली, कुसुंबे, दहिवेल, पाटणे, बेटावद, पिंपळनेर, कासारे इ. गावांना पाटाद्वारे पाणी दिले जायचे. व त्यापैकी एका ठिकाणी या पाण्यावर जवळपास २७ बिघे जमिनीत १७८५-८६ मध्ये उसाची लागवड केल्याचे उल्लेख मिळतात.१७
आधुनिक काळातील खानदेशच्या जलसंस्कृतीवर वाईट परिणाम झाल्याचे आढळून येतात. एकेकाळी अतिशय संपन्न म्हणून ज्याचा उल्लेख झाला त्या नंदुरबारला मुंबई प्रांताचा गव्हर्नर माउंट स्टुवर्ट एल्फिन्स्टन याने ऑगस्ट १८१८ मध्ये भेट दिली तेंव्हा तो आपल्या डायरीत लिहतो की, ‘दक्षिण भारतात दयनीय कोणते शहर मला दिसले असेल तर ते नंदुरबार’.
१९२१ मध्ये खानदेशचा पहिला नकाशा तयार केला तो क̆प्टन जॉन ब्रिग्ज याने – आर्थर व्हाईट व जेम्स एव्हर्स यांच्या सहाय्याने. यावेळच्या सर्व्हेनुसार खानदेशात विहिरींची संख्या २७०३१ व बंधारा-यांची संख्या १४० इतकी होती. तसेच २१६८ चौरस मैल जंगल सरकारच्या ताब्यात होते. एकूण ५३८ शाळा त्यावेळी होत्या. याचाच अर्थ बदललेल्या पर्जन्यमानामुळे पश्चिम खानदेशचा नंदुरबार सारखा भाग होरपळलेला होता परंतु पूर्व खानदेशात विशेषतःरावेर, सावदा, फैजपूर या भागावर त्याचा कोणताच दुष्परिणाम झालेला नव्हता, आजही भारतातील केळीच्या एकूण उत्पन्नापैकी २०% केळीचे उत्पादन तापीच्या याच पट्ट्यात होते. तरीदेखील १८ वे ते २० वे शतक या दरम्यान धुळे जिल्ह्यात जाल्संकृतीचे रक्षण करण्यासाठी फड पद्धतीचा विकास झाला ज्या १९८४ मध्ये धुळ्यास वास्तव्यास असलेल्या भारतरत्न सर विश्वेश्वरय्या यांनी मैसूर संस्थानातही मोठया प्रमाणात उपयोग केला.
स्वातंत्र्योत्तर काळखंडात मात्र हरताळे, म्हसवे, वेल्हाळे, मेहरूण या जळगाव जिल्ह्यातील तलावांबद्दल बोलायचे तर ज्या मेहरुनच्या काठावर बहिणाबाई सारखी जीवनाचे तत्वज्ञान अत्यंत सोप्या शब्दात सांगणारी आधु महान कवयित्री राबली तो मेहरूण असो व इतरही तलाव या सर्वाकडे, जाणून बुजून दुर्लक्ष होत राहिले, इतरही धुळे नंदुरबार जिल्ह्यातील तलावाचे कित्येक वर्ष हीच स्थिती आहे.
परंतु आम्ही खानदेशच्या जलसंस्कृतीच्या उपासकाने कधीही हे विसरता कामा नये की खानदेशातील एकूण ग्रामनामांपैकी १३% वर गावांची नावे पाण्याशी संबधित आहेत.१८ उदा :-
पाणी :- अंबापाणी, गेरुपाणी, भांगरापाणी, मोगरापाणी, कुंड्यापाणी इ.
विहिरी :- अलविहीर, दगडीविहीर, खोलविहीर, वाव्याविहीर, धावळीविहीर इ.
कुवा :- अक्कलकुवा, मालकुवा, अमलकुवा, बोरीकुवा इ.
तळे :- निमतळे, तामतळे, खडतळे, तळेगाव इ.
कुंड :- बोरकुंड, बेडाकुंड, माकडकुंड इ.

खानदेशच्या आधुनिक जलसंस्कृतीत दोन अत्यंत महत्वाच्या बाबी नोंद करणे इथे संयुक्तिक ठरते.
पाण्याचा थेंब थेंब रुजवून अब्जावधी लिटर पाण्याची बचत करावी या उद्दिष्टाने याच खानदेशच्या मातीतील सुपुत्राने पद्मश्री डॉ. भवरलाल जैन यांनी जैन इरिगेशन ची स्थापना करून खऱ्या अर्थाने जलक्रांती घडवली. एक महान स्वप्न उराशी बाळगून स्वप्न त्यांनीच उभारलेल्या गांधी रिसर्च फाउंडेशन, जळगाव च्या ३० जानेवारी ते १२ फेब्रुवारीच्या पदयात्रेत मला हे पाहायला मिळाले की सातपुड्याच्या कुशीत कुंड्यापाणी हे ७०० लोकवस्तीचे छोटेसे गाव आहे. या गावात डोंगराच्या कुशीतून वाहत येणारा केवळ पाण्याचा झरा हे एकमात्र साधन असतानाही लागेल तेवढेच पाणी वापरून कधीही पाण्यासाठी संघर्ष न करणारे हे एक आनंदी गाव आहे. तसेच गिरणेच्या काठावर जळगाव तालुक्यात लमांजन हे एक असे गाव आहे की ज्याच्या शेजारून वाहणाऱ्या गिरणा नदीत मोठे मोठे पाषाण आहेत पण ज्या गावाने ४६ वर्षापूर्वी ग्रामसभेत ठराव पारित केला की ‘जो कोणी नदीतच नव्हे तर नदीकडील बाजूला जरी शौचाला गेले तर तो गावातून हद्दपार करण्यात येईल, संपूर्ण गाव त्याच्यावर बहिष्कार टाकेल. आपल्या गावाच्या नदीचे पावित्र्य आणि पाण्याची शुद्धता राखण्याची जबाबदारी आपली आहे.’ आणि आजही सर्व ग्रामस्थ याचे पालन करतात.
खरे म्हणजे आजच्या काळात हि अत्यंत आदर्श अशी उदाहरणे आहेत कारण आपण जर नदी, तलाव इ. मध्ये शौच व इतर घाण करत असू आणि आपण जर कितीही फिल्टर लावले, कितीही पाणी शुद्धीकरण यंत्र वापली तरी आपल्याला पाण्यापासून होणाऱ्या आजारांपासून कोणीही वाचवू शकत नाही.
जलसंस्कृतीचा असा आदर्श निर्माण करून देणाऱ्या खानदेशचे आपण वारस आहोत त्यामुळे हा घेतला वसा टाकू नका, पाणी वाया घालू नका, वाया कोणाला घालू देऊ नका, हि जलसंस्कृतीची साठा उत्तराची कहाणी सफळ संपूर्ण.



माहितीपूर्ण आहे खरा, पण खूप विस्कळित आहे आणि प्रदीर्घ आहे. लेख जर दोन तीन भागांत विभागला असता तर थोडा मुद्देसूद वाटला असता. खूपशी जंत्री आहे. असो.
१)प्रकाशा येथे कुंभमेळ्याची परंपरा खरेच आहे का? ही माहिती मला नवीन आहे.
२)सर मोक्षगुंडम विश्वेश्वरय्या यांचा मृत्यु दि. १२/४/१९६२ रोजी झाला. १९८४मध्ये नव्हे.
३)"नंदुरबार जिल्ह्यातील पाण्याची उपलब्धी व जीवनमान याचे वर्णन करताना १३३५ ते १३६५ या कालखंडात खानदेशातून प्रवास करताना लिहितो – ‘इस छोटे से नगर के लोग कला-कौशल के द्वारा हि अपना निर्वाह करते है. इनमे से कोई कोई वैद्यक तथा ज्योतिष के भी अपूर्व ज्ञाता है. चावल, हरे शाक-पात और सरसों का तेल यहां के प्रधान खाद्यपदार्थ है. यहां मदिरापान दूषण समझा जाता है और कोई आदमी मद्यसेवन नही करता. १२'' हे वर्णन इब्न बतूताचे आहे हे तळटीप बघितल्यावरच कळते. शिवाय हे सर्व आधुनिक शुद्ध हिंदी रूपांतर आहे ह्याचा उल्लेख हवा होता.
४)केळ्यांची लागवड खानदेशात पूर्वापार असली तरी तिला खरा बहर कोंकणात ठाणे जिल्ह्यातली लागवड रोगग्रस्त झाल्यावर म्हणजे १९७० नंतर आला. तोपर्यंत हिरव्या सालीच्या केळ्यांची ग्रोझ मिशेल व तत्सम उपजाती आणि वेलची, मुठेळी, राजेळी वगैरे ठाणे जिल्ह्यातल्या जाती मुंबईत लोकप्रिय होत्या. पाठ्यपुस्तकांतही वसईच्या केळ्यांविषयी माहिती असे.

 

जलव्यवस्थापनाचा वारसा

अश्मयुग, ताम्रपाषाणयुग व सिंधू संस्कृतीचा विकास अभ्यासताना एक गोष्ट लक्षात येते, ती म्हणजे भूगर्भातील जलस्रोत शोधून त्याचा उपसा करण्याचे तंत्र ही मानवी जीवनातली मोठी क्रांती होती. वारंवार पडणार्‍या दुष्काळावर मात करण्यासाठी महाराष्ट्रातील भूवैशिष्ट्ये लक्षात घेत, भूमिपरीक्षा व भूगर्भातील जलस्रोताचा शोध घेत कुंड, कूप, पुष्करिणी, तडाग व विविध प्रकारच्या बारव बांधल्या गेल्या. जलव्यवस्थापनाच्या या समृद्ध वारशाची माहिती देणारा अभ्यासपूर्ण लेख

मानवी जीवनामध्ये एक नैसर्गिक गरज म्हणून पाण्याला अत्यंत महत्त्व आहे. आपण जलस्रोताला जीवन असेच म्हणतो. प्रारंभिक माणसाने निसर्गत: उपलब्ध असलेल्या जलप्रवाहाच्या काठावर, नदीच्या काठावर वसाहत केली. सर्व प्रमुख संस्कृतींचा विकास नद्यांच्या खोर्यांतच झाला, ही वस्तुस्थिती आहे. पण मानवी वसाहतीसाठी म्हणून जेव्हा यापेक्षा जास्त भूभाग त्याला आवश्यक वाटला, तेव्हा नैसर्गिक भूस्तररचनेचा अभ्यास करून लहानमोठे बंधारे घालून उपलब्ध जलाच्या अनुषंगाने त्याने शेती करण्यास प्रारंभ केला. अश्मयुग, ताम्रपाषाणयुग व सिंधू संस्कृतीचा विकास पाहत असताना हे लक्षात येते की, जमिनीच्या पोटात असलेले भूगर्भातील जल शोधून त्याचा उपसा करण्याचे तंत्र ही मानवी जीवनातील एक मोठी क्रांती होती. त्याला लागलेल्या चाकाच्या शोधाइतकेच महत्त्व या बाबीला होते. त्यातून वेगवेगळ्या भूप्रदेशांमध्ये वस्ती करण्यास त्याने प्रारंभ केला. सिंधू संस्कृतीच्या संदर्भात ही बाब इसवीसनपूर्व अडीच ते तीन हजार वर्षांपूर्वी घडली. महाराष्ट्रासारख्या दंडकारण्यप्रवण क्षेत्रात मानवी वसाहतींचा विस्तार मोठ्या प्रमाणात प्रारंभ होण्यासाठी अगदी प्रारंभिक ऐतिहासिक काळाची वाट पाहावी लागली. इसवीसनाच्या प्रारंभीच्या काळात यामध्ये मोठी भर पडली, असे दिसते. नागरीकरणाचा विस्तार सातवाहनकाळात मोठ्या प्रमाणात झाला. यानंतरच्या काळात भूगर्भातील जलस्रोत शोधण्यासाठी निसर्गत: उपलब्ध असणार्‍या पर्यावरणाचा अगत्याने झालेला अभ्यास, तसेच सूक्ष्म निरीक्षण आणि आचार्य कुलांकडून पारंपरिक शहाणपणाच्या आधारे झालेला विकास लक्षात येतो. यामध्ये वास्तुशास्त्रविषयक ग्रंथांतून भूमिपरीक्षा यासारखे लेखन होऊ लागले. वराहमिहिराने वेगवेगळ्या क्षेत्रांत पडणारा पाऊस याविषयीचे अंदाज व्यक्त केले. मानसार या वास्तुशास्त्रविषयक ग्रंथात काही प्रयोग दिले गेले. समरांगणसूत्रधार, अपराजितपृच्छा याही ग्रंथांमध्ये काही निरीक्षणे नोंदवल्याचे दिसते. साधारण चौथ्या-पाचव्या शतकापासून बाराव्या-तेराव्या शतकापर्यंत यात भर पडत गेली. परिसरात उपलब्ध असलेल्या वनस्पती, जमिनीचा स्पर्श, गंध, रंग व नाद याचबरोबर परिसरातील खडकांची घडण, मातीचा पोत, स्थानावरील वनस्पतिजन्य व प्राणिजन्य खुणा यांचा अभ्यास करत अनेक शतकांच्या अनुभवातून काही सूत्रे सिद्ध केली गेली. सहदेव भाडळीसारखे काही तोडगे सांगणारे साहित्यही संग्रहित होऊ लागले. उदाहरणार्थ, जांभूळ वृक्षाच्या पूर्वेस वारूळ असेल तर त्याच्या दक्षिणेस दोन पुरुष खोलीवर गोड पाणी लागते. वड, पळस, उंबर एकत्रित असतील तर तेथे निश्चितपणे उदक आहे. वड व पिंपळ वृक्ष एकत्रित असतील तर त्याच्या उत्तरेस चार हातांवर खणले तर पाणी लागते. तसेच ज्या भूमीवर मुंज, काश व कुश या प्रकारचे गवत उपलब्ध असेल, जमीन खोदली असता निळसर, खडकाळ भाग लागला, किमान काळी व त्याखाली तांबड्या रंगाची माती असेल, तर तेथे गोड पाणी लागते. (पाठक, महाराष्ट्रातील बारव स्थापत्य, पृ. 29, 2017.) अग्निपुराण तसेच कृषीपाराशर व अन्य स्मृतिग्रंथांतून याविषयीच्या नोंदी मिळतात. अर्थात जमिनीखालील पाण्याला आपण भूजल म्हणतो, त्याचा अचूक शोध घेणे हे बारव बांधण्यापूर्वी किंवा विहीर खोदण्यापूर्वी आवश्यक ठरते. महाराष्ट्रात डेक्कन ट्रॅप किंवा बेसाल्ट हा अग्निजन्य खडक आहे. त्याची सच्छिद्रता एक ते तीन टक्क्यांहून जास्त नाही. यातून तसेच चिकणमातीच्या थरातून सहसा पाणी झिरपत नाही. उलट वालुकास्तर किंवा चुनखडी यासारख्या खडकांतून पाणी मिळते. जमिनीखाली काही विशिष्ट खोलीवर सर्व प्रकारच्या सच्छिद्र भेगांनी युक्त खडक असतात. ते भूजलाने ओतप्रोत भरलेले आढळतात. (देशपांडे, महाराष्ट्राचा सांस्कृतिक भूगोल, पृ. 25, 1976.) असे असले, तरी पारंपरिक शहाणपण व सूक्ष्म निरीक्षण यांशिवाय बदलते पर्यावरण, लहरी निसर्ग, पडणारे दुष्काळ यांमुळे माणसाला भूमिपरीक्षा व भूमीअंतर्गत जलाचा शोध घेणे यासाठी जाणीवपूर्वक काम करावे लागले. महाराष्ट्रात दुर्गादेवीचा दुष्काळ हा मोठा दुष्काळ होता. साधारणपणे आठव्या ते तेराव्या शतकामध्ये विविध क्षेत्रांत कुंड, कूप, पुष्करिणी, तडाग व विविध आकारप्रकारांच्या बारवा बांधल्या गेल्या. एकीकडे स्मृतिग्रंथ व पुराणे यांच्यामुळे मानवी वसाहतीबरोबर तीर्थक्षेत्रांच्या ठिकाणी व निसर्गत: उपयुक्त ठरणार्‍या स्थानांवर विविध मंदिरांचा विकास होत होता. यापाठीमागे एक विशिष्ट दिशा असलेल्या आचार्यांची मोठी परंपरा होती. सामान्य माणसाबरोबर धनिक व्यापारी, सामंत व राजवंश अशा निर्मितीसाठी सढळ हाताने मदत करत असत. मंदिर व बारव स्थापत्याचा विकास बरोबरच होत होता. जलाशयांचे पावित्र्य राखले जावे व नगराच्या वैभवात भर पडावी, या दृष्टीने अशा वास्तूमधून विविध देवतांची प्रतिष्ठापना केली जाई. दहा द दहा आकाराच्या लहान कुंडापासून एकावर एक विकसित झालेले चार ते सात टप्पे आपणाला बारव स्थापत्यात दिसतात. एका बाजूने प्रवेश असणे, चारही बाजूंनी प्रवेश असणे, तसेच बारवेच्याच वास्तूमध्ये या भव्य जलकुंडात शेवटच्या टप्प्यावर किंवा काही ठिकाणी वेगवेगळ्या टप्प्यांवर माड, मंडप (पोर्च) बांधले जात. पाण्याची गरज तर निश्चितपणे भागवली जाई. शोधलेले जलस्रोत अगदी मोठ्या दुष्काळातही जिवंत राहत. या उपयुक्ततेबरोबरच सांस्कृतिक विकासामध्ये अशा जलाशयांचे वैशिष्ट्यपूर्ण स्थान होते आणि त्यातून वेगवेगळ्या आकारांचे मंडप, देवकोष्ठ निर्माण होत. यात शेषशायी विष्णू, सप्तमातृका, गणेश, एकादश रुद्र, उमामहेश्वर, महिषासुरमर्दिनी, भैरव तसेच विष्णूचे चोवीस अवतार यांची स्थापना होई. इथपासून नागदेवता व अनेक आचार्य, अप्सरा व मानवी जीवनातील काही प्रसंग खोदलेली शिल्पे तेथे बसवली जात. या परिसरात विविध ज्ञानशाखांचा विकास होत होता, तर चौसष्ट कलांपैकी अनेक कलांची साधना होत होती


निसर्गत: काळाच्या ओघात अशा काही वास्तूंची क्षती झाली. पण तेराव्या शतकापासून झालेल्या इस्लामी आक्रमणांचा परिणाम म्हणून विविध नगरांतील मठ-मंदिरे व बारवा उद्ध्वस्त केल्या गेल्या. बारव ही निसर्गत: उपलब्ध असलेल्या पाण्यासाठी सर्वच धर्मांच्या व जातींच्या माणसांची गरज होती, म्हणून त्याचे पावित्र्य खंडित करण्यासाठी प्रत्येक देवकोष्ठातील मूर्ती शोधून त्या नष्ट केल्या गेल्या. परिसरातील मंदिरेही उद्ध्वस्त केली गेली. या वास्तूंचे शिलाखंड किल्ल्यांच्या, इदगाहच्या व मशिदींच्या बांधकामासाठी वापरले गेले. आज उपलब्ध असलेल्या मंदिरांच्या व जलाशयांच्या वास्तू या मूळ वास्तूपैकी काही अवशिष्ट भाग आहे. या संदर्भात विल डुरांट याने लिहिलेल्या द स्टोरी ऑफ सिव्हिलायझेशन; या ग्रंथमालेतील अवर ओरिएंटल हेरिटेज या प्रथम खंडातील एक भाग ;भारतीय संस्कृती या नावाखाली मा.प. शिखरे यांनी अनुवादित केला. विशेषत्वाने ;इंडिया अँड हर नेबरया भागाचा हा अनुवाद आहे. त्यात औरंगजेबाच्या संदर्भात केलेली नोंद अशी - ;हिंदूंची त्याचप्रमाणे ख्रिस्त्यांची सर्व मंदिरे जमीनदोस्त करण्याचा, प्रत्येक कृती फोडून टाकण्याचा आणि हिंदूंची प्रत्येक पाठशाला बंद करण्याचा हुकूम त्याने आपल्या प्रांतिक सुभेदारांना आणि त्यांच्या हाताखालील अधिकार्यांना दिला. एका वर्षात, म्हणजे १६७९-८० फक्त अंबर येथील सहासष्ट, चितोडमधील त्रेसष्ट आणि उदयपूर येथील तेवीस मंदिरांची मोडतोड करण्यात आली. वाराणसी येथील एका मंदिराच्या वास्तूवर मशीद बांधून त्याने हिंदू भावनांचा उपमर्द केला. सार्वजनिक पूजाविधींवर त्याने बंदी घातली व हिंदूंवर जिझिया कर बसवला. या परिच्छेदात शेवटी डुरांट नोंदवतो की,पिसाट धोरणाची परिणती म्हणजे गेल्या हजार वर्षांत हिंदुस्थानातील कलेचे प्रतिनिधित्व करणार्या किंवा तिचे आश्रयस्थान बनलेल्या हजारो मंदिरांचा नाश झाला. हिंदुस्थान हा देश एकेकाळी किती सुंदर आणि वैभवशाली होता, याची कल्पना आज त्याच्याकडे पाहणार्याला कधीच येणार नाही. (विल डुरांट, अनुवाद - मा.प. शिखरे, भारतीय संस्कृती, पृ. ८८.) महाराष्ट्राच्या संदर्भात काही वेगळे घडले नाही. इ. स. १६८० च्या सुमारास नाशिक परिसरातील २५ महत्त्वपूर्ण मंदिरे पाडली गेली, तर जुन्या किल्ल्यातील महालक्ष्मी मंदिर जामा मशिदीत परिवर्तित केले गेले. (ब्रिटिश गॅझेटिअर, नाशिक जिल्हा, खंड दतख, पृ. ५०३.) महानुभाव स्थानपोथीमध्ये अनेक स्थानांचे तपशील मिळतात. ते नंतरच्या काळात दिसत नाहीत. पैठण (जिल्हा औरंगाबाद) येथे यादव काळापर्यंतच निर्माण झालेली ४२ मोठी व १९ लहान देवळे होती. त्यापैकी काहींवर अकबराचा पुत्र दानियाल याच्या विवाहाप्रसंगी मशीद व मोहल्ले इस्लाम उभारण्यात आले. शहाजहानच्या काळात शहाजहानपुरा वसवला. औरंगजेबाच्या काळात चक्रपाणी मंदिराचे रूपांतर मस्जिद-ए-कोट व जुम्मा मस्जिद यांच्यात झाले. सेतुमाधवराव पगडी यांनी सूफी संप्रदायाबद्दल लिहिताना या विषयीच्या नोंदी विस्ताराने केल्या आहेत. एकूण आज पैठणमध्ये दोन-चार मूर्तींव्यतिरिक्त एकही वास्तू मूळ रूपात उभी नाही. मंदिराबरोबरच जलव्यवस्थापनाचा भाग म्हणून उभ्या राहिलेल्या वास्तू नंदा, भद्रा, जया, विजया या प्रकारातील मोठाल्या बारवा होत्या. आज या काळातील दोन-अडीचशे गावांपैकी अपवादात्मकरित्या पिंगळी (जिल्हा परभणी), इडोळी (जिल्हा जालना), जागजी (जिल्हा उस्मानाबाद), अंबाजोगाई, मानूर (जिल्हा बीड) या स्थानांवर असलेल्या देवकोष्ठांमध्ये देवतांच्या मूर्ती उपलब्ध आहेत. अन्य स्थानांबाबत पाण्याची गरज म्हणून बारवा शिल्लक राहिल्या, मात्र देवकोष्ठे रिक्त झाली. उत्तरकाळात, विशेषत: पेशवाईत, पेशवे व त्यांचे सरदार नारो शंकर, ओक, चंद्रचूड, औंढेकर, थोरल्या माधवरावांची आई गोपिकाबाई यांच्या प्रेरणेतून मूळ प्राचीन वास्तुशास्त्राचा वारसा लक्षात घेऊन त्र्यंबकेश्वर, नाशिक, कायगाव टोके या ठिकाणी मंदिरे, घाट यांची पुन्हा निर्मिती झाली. अहल्याबाई होळकर यांचे या बाबतीतील काम अनन्यसाधारण स्वरूपाचे आहे. वेरूळच्या घृष्णेश्वर मंदिरास खेटूनच असलेले कुंड जाणीवपूर्वक पाहावे. त्याचप्रमाणे त्र्यंबकेश्वर येथील कुशावर्त तीर्थ मुद्दाम पाहावे असेच आहे. पेशवाईच्या अस्तानंतर एकही उल्लेखनीय वास्तू उभी राहिली नाही.

आज महाराष्ट्रात उभ्या असलेल्या बारवा किमान 800 वर्षापूर्वींचा जलव्यवस्थापनाचा वारसा सांगतात. त्या आपण जाणीवपूर्वक जतन केल्या, तर हे सांस्कृतिक वैभव पुढच्या पिढीकडे मूळ स्वरूपात हस्तांतरित करता येईल. यासाठी काही पथ्ये पाळणे आवश्यक आहे - उपलब्ध बारवा नियमितपणे साफ करणे, अनावश्यक वाढलेली झाडे व्यवस्थितपणे काढून घेणे, निखळलेले चिरे मूळ स्वरूपात बसवणे. बारव जतन करताना प्रामुख्याने सर्वात खालच्या पातळीवरील कुंड असते, तेथील निखळलेले चिरे मूळ जलप्रवाह अखंडितपणे सुरू राहील याची दक्षता घेऊन बसवावे. अनावश्यक रंगरंगोटी न करता त्याचे मूळ स्वरूप कायम ठेवून निखळलेला भाग व्यवस्थितपणे जतन केला गेला पाहिजे. बारवेसभोवताली सगळ्या बाजूंनी किमान दीड मीटर रुंदीचा एक दगडी चौथरा करून घ्यावा. त्याच्यामुळे वरील पट्टा ढासळणार नाही. या चौथर्याच्या सभोवताली एक फूटभर रुंद व दोन फूट खोल अशा मापाची नाली व्यवस्थित बांधली, तर बाहेरून खराब पाणी आत जाणार नाही. याशिवाय उपलब्ध होईल तेवढ्या परिसरात उद्यान विकसित करता येईल. वारंवार पाण्याचा उपसा करणे, पाण्यात वाढणार्या वनस्पती व शेवाळ काढून टाकणे, मत्स्योत्पादन करणे, याबरोबरच विहिरीतील पाणी बाहेर एका टाकीत घेऊन ते पाणी तहान भागवण्यासाठी, कपडे धुण्यासाठी व इतर उपयोगासाठी वापरता येईल. प्रामुख्याने लहान मोठी मुले व तरुण बारवेत पोहत असतात. पाण्यात जाण्यापूर्वी त्यांनी स्वत:चे शरीर स्वच्छ करण्याची जबाबदारी घ्यावी. सर्वसाधारणपणे या बाबी पाळत असताना स्थानिक वारशाविषयी एक लहानशी माहिती पुस्तिका उपलब्ध असावी, तेथील माहिती देणारा फलक तेथे असावा, नव्या पिढीला आपल्या वारशाविषयीची जाणीव होण्यासाठी स्थानिक शाळा व महाविद्यालये येथे विद्यार्थ्यांना त्याची जाणीव करून देण्यात यावी. परिसरातील एखादी संस्था किंवा गट यांनी या वारशाची जोपासना करावी, दैनंदिन स्वच्छता कायम ठेवावी. स्थानिक स्वराज्य संस्थेकडून या स्थानापर्यंत येणारा मार्ग चांगला राहील याची काळजी घेणे आवश्यक ठरते.

याशिवाय जर आपणाला हे वारसा वैभव - मग ते मंदिराचे, प्राचीन जलाशयाचे किंवा विविध आकारप्रकारांच्या बारवांचे असो, त्यांचे जतन, संवर्धन व भावी पिढीकडे हस्तांतरण करायचे असेल, तर अशा बारवेत असलेल्या एकूण देवकोष्ठांची (देवळ्यांची) संख्या लक्षात घ्यायला हवी. प्रशस्त अशी तीन फूट रुंदीचे देवकोष्ठ असेल तर तेथे शेषशायी विष्णू किंवा सप्तमातृकापट असतो. संख्या सात असेल त्यात मातृका देवतेची स्थापना केलेली असते. अकरा किंवा बारा देवकोष्ठे असतील तर एकादश रुद्राची व स्वतंत्र उमामहेश्वरांची प्रतिमा असते. याशिवाय चोवीस देवकोष्ठे असतील तर विष्णूच्या चोवीस विभव (मूर्ती) असतात. याशिवाय ब्रह्मा, भैरव, नागदेवता यांच्याही मूर्ती असतात. आज आपण प्रतीकात्मकरित्या एक ते पाचपर्यंत मूर्ती बसवू शकतो. यात गणेश, शिव, विष्णू, मातृका व सूर्यदेवता असू शकतात. मात्र असे करताना ज्या दगडात ही वास्तू बांधली आहे, त्याच दगडात व वास्तूला साजेशी अशी मूर्ती असावी. बारवांचे उद्यापन व वार्षिकोत्सव प्रतिवर्षी साजरे करण्याची पद्धत आपल्याकडे रूढ होती. तसेच होळीच्या सुमारास प्रतिवर्षी हे जलाशय सामुदायिक सहभागाने स्वच्छ करण्याचीही पद्धत होती. याशिवाय परिसरातील पाणलोट क्षेत्राचा अभ्यास करून परिसरात निसर्गत: असलेला ओढा रुंद करणे, त्याच्या मूळ स्वरूपात प्रवाहित करणे, आवश्यक तेथे वृक्षारोपण करणे यांसारखे विषयही हाताळले जाऊ शकतात. कुठल्याही जलसाठ्याचे सातत्य हे त्याच्या निसर्गदत्त पुनर्भरण व्यवस्थेवर अवलंबून असते. आपल्या पूर्वजांनी शेकडो वर्षांपूर्वी परिश्रम घेऊन निर्माण केलेला हा वारसा आपण जतन करण्याचा सामूहिक वसा स्वीकारायला हवा.

बारव

 महाराष्ट्र बारव मोहीम

(Maharashtra Stepwells Campaign)

Conservation of Maharashtra’s stepwells through people’s participation

One of the areas of knowledge India excelled in the past was building efficient water management systems. The historical water conservation and supply systems in the arid regions of India are testimony to this fact. However, thanks to the changed notion of development, many of the structures which served the need of people for centuries suddenly became redundant and are lying in the state of misery today. At a time when several parts of the country are facing severe water shortage, the need to revive these invaluable water sources cannot be emphasised more.

Stepwell is undoubtably one of such system which served the water requirement of people for drinking, bathing, washing and even irrigation occasionally. The State of Maharashtra has thousands of Stepwells. If revived, they could become an excellent source of water for drinking and domestic use for people in rural areas. And the first step to do this is to map and document all the stepwells in the state. 

With this goal in mind, we have set out on a journey to explore the historic stepwells in Maharashtra and have mapped 1300+ Stepwells so far.

Our Goals : 
~ Creating the largest and most reliable database of Stepwells in Maharashtra for research and conservation purposes.
~ Identify thousands of Stepwells (capturing gps coordinates and mapping them on custom google map for public view).
~ Capture Photographs/Drone Shots of Stepwells.
~ Collaborating with colleges for study of architectural designs of stepwells.
~ Organize cleanliness drives.
~ Collaborating with people and government for conservation of stepwells.
~ Encourage villagers / local heritage explorers to also identify unique stepwells as tourist attractions.
~ Organize free study tours for students.
~ Sharing good work done by respective village locals/authorities in conserving stepwells through social and print media to motivate other villages/states.
~ Ecological water purification system for stepwells.

Our Vision : 
~ Urbanized Areas/Cities : Heritage Conservation and Tourism Development.
~ Village/Remote Interior Areas : Water can be used for Irrigation Purpose / Water can be utilized during Drought Times.
~ Study ancient trade routes as stepwells were built along the trade routes.
~ Celebrate Stepwell Mahotsav in Maharashtra, our stepwells to be lit up with Diyas and we familiarize our People/International Visitors about Indian History and Culture at each Stepwell Site region wise : State/District/Taluka/Village.



We are Exploring Stepwells in Maharashtra which includes बारव/बाव/घोडबाव, पायविहीर, कुंड, पुष्करणी, पोखरण, Helical स्टेपवेल्स.
Instructions in English : 
Google Map for Viewing Stepwell Locations : 
*Open the below map in your google maps by clicking on the right top corner box.
*Zoom in and click on the Pin Locations (Blue-White Circle). It will reflect the Stepwell Location and Pic if available of the Stepwell.
*Click on the Direction Button and it a route will start to guide you to the stepwell location.
*This customized google map will get automatically get stored in your google maps and everytime we add new stepwells, it will get updated in your google maps.

Instructions in Marathi : 
*कृत्रिम पद्धतीने बनवलेला नकाशा गुगल मॅप मध्ये उघडा (वरती उजव्या बाजूच्या चौकोनावर क्लिक करा).
*नकाशा झूम करा व निळ्या-पांढऱ्या वर्तुळावर क्लीक करा. तुम्हाला सगळ्या बारवांची नकाशा मध्ये स्थाने व छायाचित्रे दिसतील.
*त्या ठिकाणी जाण्यासाठी 'Direction' वर क्लीक करा. आता तिकडे कसं जायचे व तुम्ही तुमच्या स्थानापासून ती बारव किती लांब आहे हे कळेल.
*सगळ्या बारावांचे नकाशे व स्थाने तुमच्या गुगल मॅप मध्ये संग्रहित झालेले असतील, आणि जेवढे बारव आढळतील तेवढे त्या नकाशात संग्रहित होतील. 
(आता यापुढे तुम्ही थेट गुगल मॅप वर नेहमी सगळ्या बारावांचे नकाशे बघू शकता).

Exact Locations of Stepwells in Google Maps

==========================
Stepwells in Konkan Region
(Raigad ~ Ratnagiri ~ Sindhudurg ~ 
Mumbai ~ Thane ~ Palghar)
 

 
अतिरिक्त माहिती आणि छायाचित्रांसाठी इंस्टाग्राम वर फॉलो करा.

लोभ असावा !
राहुल अभ्यंकर, विरार.
 

 
 
 

 इरान -इराक मधील विकसित झालेली जलप्रणाली बऱ्हाणपूरात निर्माण केली गेली


        
                 

अश्या प्रकारे १०० कुंड्या आहेत
                  यातून पाण्याचा आवाज स्पष्ट येतो



 
  
                              
                                 नकाशा
                                लिफ्ट




मध्ययुगीन भारताच्या इतिहासात बऱ्हाणपूर हे शहर अत्यंत महत्वाचे होते या काळात या शहरात अनेक ऐतिहासिक घडामोडी घडल्या अगदी मुघल बादशहा अकबर,जहागिर,शहाजहान या भागात बराच काळ होते औरंगजेब तर बरेच वर्ष या भागात राहीला.मराठयांचा इतिहासही या भागाचा उल्लेख केल्याशिवाय पूर्ण होत नाही .एका दिवसाचा परतीचा दौरा म्हणून नेहमी प्रमाणे अचानक महाशिवरात्र सुटी म्हणून आशीरगडाच्या भेटीसाठी म्हणून आदल्या रात्री आमचे सुरेश देवकर सर,गजानन राऊत,सर व सुशिल पनाड सरांचे नियोजन झाले . सकाळी ७ वाजता निघून १० वाजता बुलढाण्यावरुन बऱ्हानपूर पोहचलो तेथे सुरेश देवकर सरांचे मित्र बऱ्हानपूर मधील प्रसिद्ध वकिल अँड कलिम खान साहेब अामची वाटच पाहत होते त्यांच्याकडूनच सर्व शहराची माहीती आम्हाला दिवसभरात झाली मोहीम अाशीरगडाची होती पण दिवसभरात बऱ्हानपूरचा काना कोपरा फिरलो वकील साहेबांच्या आदर तिथ्यासह सर्व ऐतिहासिक माहीती मिळाली पर्यटनातून ज्या ठिकाणी जाताही आले नसते ती ठिकाणे त्यांनी दाखविली त्यावर प्रत्येक वास्तु नुसार सचित्र आपण माझ्या ब्लॉग वर पाहत आहातच !
      आपण आता पाहू या कुण्डी भंडारा / खुनी भंडारा विषयी ..।
बऱ्हानपूर हे शहर त्या काळचे महत्वाचे व्यापारी केद्र होते .सुरत जाण्यासाठी हा मार्ग महत्वाचा मानला जायचा .बरा२,जोधपूर,आग्रा,हैद्राबाद,औरंगाबाद ही महत्वाची शहरे व्यापारी दृष्टया बऱ्हानपूरशी जोडली गेली होती या बहुतेक महामार्गावर दुतर्फा झाडे जागोजागी विहीरी खोदलेल्या दिसतात .बऱ्हानपूर -सूरत बंदरातून टर्की,पोलंड,मास्को या देशात मलमलचा व्यापार चालत असे .जहागिर बादशहाच्या काळात बऱ्हाणपूर येथे टॉमस रो या इंग्रज व्यापाऱ्याला कपड्याच्या कारखाण्याची परवानगी देण्यात आली होती .
    अश्या शहरात व्यापार व प्रशासनच्या दृष्टीकोनातून ताप्ती नदीच्या काठावर शाही महल सारख्या अनेक इमारतीचे निर्माण झालेल दिसते .
कोणत्याही मोठया शहराचा सर्वात महत्वाचा भाग म्हणजे पाण्याची व्यवस्था ही पाण्याची व्यवस्था जागतीक स्तरावर विचार करायला लावणारी आहे .
     मुगल शासक अकबराच्या दरबारातील नवरत्नापैकी असलेले अब्दुल रहीम खान खाना याने जहागिर बादशहाच्या काळात १६ १५ मध्ये या शहरासाठी अदभूत अश्या योजनेच्या माध्यमातून " कुण्डी भंडारा " निर्माण केले .

रहीमन पानी राखिये ,बीन पानी सब सून
पानी गये ना ऊबटे,मोनी मानुष चून ।।
                                  ४०० वर्षापूर्वी या भव्य दिव्य योजनेच्या निर्माण कर्त्याचे वरील काव्य आहे.पाण्याची जपून साठवण करा ,पाण्याविना काहीच नाही,पाणी गेल तर माणसाचं काही खर नाही या गोष्टीचा विचार करून त्याने शहराच्या भरभराटीसाठी " कुण्डी भंडारा " ही योजना पूर्णत्वास नेली.
        सातपुड्यातील पर्वतरांगेतून प्राकृतिक पध्दतीने पाण्याचे संग्रहण केले .भूमीगत पाण्याचा स्तोत्र शोधला त्याला एकत्र केले व हे पाण्याचे स्तोत्र नहर रूपाने जमीनीत ८० फुट खोलावरून वाहत शहराकडे आणले यासाठी १०० कुंडी तयार केल्या या कुंडी विशिष्ट अंतरावर ठेवत या कुंडीतून विहीरी प्रमाणे पाणी काढण्याची सोय केली हे पाणी शेती ,बाग,महल,सामान्य लोकासाठी उपलब्ध झाले .तयार करण्यात आलेल्या कुंडीत उतरुन साफसफाई करता येते .मागील काळात या योजने कडे दुर्लक्ष होते त्यात घाण व इतर बऱ्याच समस्या होत्या पण आता प्रशासनाने याची साफसफाई करून पर्यटनासाठी खुले केले आहे त्यातून परीसरातील गावाला पाणी पुरवठा होत आहे .पाणी अतिक्षय गोड व थंड आहे प्रशासनाने ८० फुट खोल नहर मध्ये उतरण्यासाठी लिफ्टची व्यवस्था केली अाहे.
       कुण्डीत पाणी एका मुख्य हॉल सारख्या भागात जमा होते त्याचा धो धो आवाज अगदी स्पष्टपणे येतो. वायु दाबाच्या प्रणालीवर ही योजना आजही सुरू आहे .पूर्वी बऱ्हापूरात हे पाणी पोहचत होते पण आता काही भागात हे पाणी जाते कारण मधे बऱ्याच विहीरी व बोअर यामुळे याला फटका बसलेला दिसतो .
    सोबत या पाण्याच्या योजनेचा नकाशा दिला आहे की कशा पद्धतीने हे पाणी शहराच्या विविध भागात जायचे .यामध्ये सूखा भंडारा,मूल भंडारा,चिलाहरण भंडारा,कुंडी भंडारा हे भाग आहेत .याच कुंण्डी भंडाराला खूनी भंडारा सुद्धा म्हटलं जात याचं कारण पूर्वी त्या कुण्डीत खून झाले होते म्हणून स्थानिक त्याला खूनी भंडारा म्हणू लागले.
   अशी विस्मयकारी स्थळ प्रत्यक्ष पाहींली की एक वेगळी उर्जा शरीरात संचारते व मन पुढच्या मोहीमेकडे वळते .
    पुढच्या भागात आपण माहीती पाहू या अगबराच्याही अगोदरच्या काळात बांधल्या गेलेल्या व आजही सुस्थितीत असलेल्या प्रसिध्द शाही जामा मज्जीत विषयी..............

https://shivjagars.blogspot.com/2020/05/blog-post_28.html
                       संजय खांडवे 
                        9011971122

 
 







https://maitri2012.wordpress.com/2024/09/
भाग १० : किल्ला आणि बंधारे

ग्वाल्हेरच्या माणसाला ग्वाल्हेर किल्ल्याचे प्रचंड आकर्षण व तेवढेच अप्रूप..दिसायला निःसंशय अतिशय देखणा..पर्शियाहून आलेला निळा रंग वापरून ” मान मंदिर ” चे अनोखे रूप,तो तजेला अजूनही तेवढाच मोहात पाडतो. मी जेव्हा मुंबईला प्रथम आले आणि पूज्य मामंजी म्हणाले, “मी जरा मुंबईला जाऊन येतो हं,” मी दचकलेच ..”आपण मुंबईतच आहोत ना ?” पण नंतर खसखस पिकली, कळताच की ही जुनी पिढी अजूनही फक्त दक्षिण मुंबईलाच मुंबई मानते. इतर फक्त उपनगरे..तसेच ग्वाल्हेरला प्रथम जाणारा माणूस भांबावतो. स्टेशनवर उतरताच त्याच्या कानी टेम्पो, रिक्षावाल्यांची पृच्छा ऐकू येते, ” साब, ग्वालियर, ग्वालियर ??..”
कारण तेथेही बिरला नगर, लष्कर, ग्वालियर, मुरार असे भाग पाडले आहेत. किल्ला हा ” ग्वालियर ” भागात येतो. पूर्वी तो पायथा इतका गजबजलेला नव्हता.. आता भयंकर दाटी वाटी झाली आहे. सर्वच शहरांची ही वाढीव लोकसंख्या पूर्वीचे निसर्ग सौंदर्य नष्ट करीत आहे याचा खेद वाटतो.

 

 

असे म्हणतात..सहाव्या शतकाच्या सुरुवातीपासून हा किल्ला अस्तित्वात आहे. येथेच एक शिलालेखही मिळतो ज्यावरून सिद्ध होते की ‘ शून्य ‘ ही भारताचीच देणगी आहे . असे सांगतात, या किल्ल्याची सुरवात राजा सूर्य सेनने केली. बेसाल्ट खडक असलेल्या या डोंगराला ” गोपाचल किंवा गोपगिरी  ” म्हणत असत.याचाच अर्थ कृष्णाचे गोप म्हणजे  ” ग्वाल ” येथे राहत.. त्यांच्या सहच ..”अय्यर ” राहत.. त्याचा अपभ्रंश होत ..इयर ..झाले आणि नाव पडले ..ग्वालियर. नूतनीकरण केलेला किल्ला ही तोमर राजपूत राजे ..मानसिंग तोमरचे कार्य आहे. ग्वाल्हेर नावाबद्दलही अनेक कथा ऐकायला मिळतात. किल्ल्याचा इतिहास खूप मोठा आणि जुना आहे. रसिक वाचकांना त्याबद्दल भरपूर व्हिडीओज अथवा माहिती महाजालावर मिळते. आता तेथे ” साऊंड आणि लाईट शो ” उत्तम प्रतीचा बघायला मिळतो.

महाराज मानसिंग एकदा मृगया करण्यास गेले असता त्यांना निन्नी नावाची एक गवळण दिसली. दोन धृष्टपुष्ट वळू त्वेषाने एकमेकांवर चालून जात होते. त्यांचे ते महाभयंकर नाक फुलवित, फुत्कार सोडीत होणारे युद्धच जणू ..या मुलीने लीलया सोडवले. ते बघून राजा आरक्त..!. तिला पट्टराणी करणारच, हे ठरविल्याने इतर मंत्रीगण नाराज झालेत पण राजाची इच्छा! ती स्वाभिमानी मुलगी, गरीब, खालच्या जातीची पण बाणेदार ..तिने तीन अटी घातल्या

१..मी या सांक नदीचेच पाणी पिणार..
२..मी वेगळ्या महालात राहणार ..
३..तुम्ही जर युद्धावर गेलात तर मी देखील येणार ..

‘मृगनयनी’ कादंबरीचे मुखपृष्ठ

तिच्या या तीनही अटी मान्य झाल्या. ते गुजरी महल देखील बघण्यासारखे आहे. तिच्यासाठी मोठमोठाले पाईप्स घालून सांक नदीचे पाणी तिच्या महालापर्यंत आणले. ती पाईपलाईन अजूनही दिसते. ती संगीतज्ञ होती, असेही सांगतात. आख्यायिकाही असू शकतात. राग..गुर्जरी तोडी ..हा तिनेच तयार केला .. म्हणतात. अकबराच्या नवरत्नांपैकी तानसेनने ‘मियाँ की तोडी’ जसा तयार केला. ती देखील दंतकथा आहे असे म्हणतात. तिचे डोळे सुंदर मृगासारखे असल्याने राजाने तिचे नाव  ” मृगनयनी ” ठेवले. मध्यप्रदेशचे सुप्रसिद्ध साहित्यिक श्री. वृंदावनलाल वर्मा हे वडिलांचे परिचित..त्यांनी ‘मृगनयनी’ नावाची कादंबरी लिहिली आणि त्यांच्याच हातून ती मला बक्षीस मिळाली, हा अपूर्व योग होता. त्यांच्या तोंडून त्या कथा ऐकणे म्हणजे मेजवानीच होती. आमच्या शाळेचा हा आणखी एक अनोखा उपक्रम.

त्या किल्ल्यावर आम्ही पुढील बाजूने चढूनही जात असू, कधी कधी मागील रस्त्याने कारने जात असू. ते खास किल्ल्यावर असलेल्या शाळेच्या वार्षिकोत्सवासाठी. खूप सुंदर रंगमंच होता त्यांचा..खुले रंगमंदिर ..दगडी पायऱ्या वगैरे. श्रीमंत जीवाजीराव शिंदे पण बघायला येत. याच शाळेत हिंदी चित्रपट नट सलमान खान, नितीन मुकेश वगैरे शिकत असत. एकदा गंमतच झाली .. वडिलांना काम असल्याने ते लवकर उठले. खरे तर असा एक अलिखित नियम होता ( अगदी दंडक नव्हे पण ) की राजे निघून गेल्यावरच इतर जातील..पण आमची प्रशस्त कार निघाली ..आणि त्या वळणदार रस्त्यावर, गोल गोल उतरत जाणाऱ्या त्या वाटेवर प्रत्येक वळणावर शिपाई खाडकन उभे राहत होते, आम्हाला सलाम करीत होते. काही वेळानंतर लक्षात आले, ते असे का वागले आणि खूप हसू लागले सर्व. आमचा कारचालक तर अगदी आनंदी..

त्या किल्ल्यासमोरच आमचे एक काका राहत असत. त्यांच्या गच्चीवरून मानमंदिर दिसे..रेखाटने करायला सोपे .

 

गूजरीने जेथून सांक नदीचे पाणी आणवले तो बांध बघायला आम्ही जात असू. तिगरा डॅम. माझ्या वडिलांना सर्वांना घेऊन सहलीला जायला आवडत असे. स्वतः इतके व्यस्त. वकील, लेखक, कवी, पुढारी, समाजकार्यात झोकून देणारे पण सहलीसाठी ही वेळ काढत. त्यासाठी खूप मोठा लाकडी पेटाराही बनवून घेतला होता. त्यात आजकाल मॉड्युलर किचनमध्ये असतात तसे अनेक कप्पे. ज्यात वाट्या, भांडी हा पसारा व्यवस्थित राहत असे. सहलीच्या जागी मस्त जागा शोधून मुलांचा नाश्ता पाणी होई. ती भांडी नदीवर जाऊन आम्ही मुले धुवतही असू.. बहुधा बहिणीच. भाऊ झाडावर चढून मस्ती करण्यात दंग किंवा संपूर्ण परिसर कॅमेऱ्यात बंदिस्त करण्यात. तो पेटारा मोठ्या कारमध्ये सहज मावत असे..असाच एक भरपूर मोठा पाच खणी डबा.. त्यात अगदी खाली कडी कोयंडा, जाळीदार डबा..ज्यात निखारे ठेवलेले.. वरील डब्यातील अन्न गरमागरम राहावे म्हणून ..  माझ्या बहिणीच्या मैत्रिणी गायिका..त्यासुद्धा येत कधी.. त्यांच्या गायनाने रंगत येई.

असेच हरसी डॅम, रमौवा डॅम, देवखोह, बुराखोह, बलदेव कुंडी, कुंवर बाबा ही स्थळे. जेथे पोहणे अनिवार्य. बालपणी पाण्याला प्रचंड घाबरणारी मी. पण सर्व आलेच पाहिजे हा वडिलांचा दंडक. त्यामुळे कितीही वेळा आईच्या पदराआड लपण्याचा प्रयत्न केला तरी ते मामाच्या मदतीने खेचणारच मला…त्याचमुळे सर्व मुले छान पोहू लागली. माझी बहिण वनिता तर सर्वोत्तमच पट्टीची पोहणारी..अजूनही पोहते. बुराखोला तर मामाला एकदा वाघीण आणि तिची पिल्ले देखील दिसली होती.


देवखोह अतिशय रम्य परिसर आहे. कारने वर चढत जाणे, पुनः खाली उतरणे… नंतर पायऱ्या उतरून त्या खोहमध्ये जाणे. ती जागा चारी बाजूंनी मोठमोठ्या वृक्षांच्या गर्द सावलीत विसावलेली. जवळच झुळझुळ वाहणारी नदी. तेथे आम्ही बरेचदा जात असू. इतरही काही समूह येत. अशा जागी मानावयाचे नियम धाब्यावर बसविणारे. एकदा असेच दुसऱ्या लोकांनी धूर केला. त्यामुळे त्या झाडावरच्या पोळातील मधमाश्या चवताळल्या. खाली धुराच्या साम्राज्यात तर जाणे कठीण आमच्याच बाजूला आल्यात. नुसती पळापळ ..आरडाओरडा. सगळे सामान तेथेच टाकून त्या ओबडधोबड पायऱ्या चढून वर जाणे आणि कारमध्ये बसणे केवळ अशक्य. सर्वात जास्त माझ्याच अंगावर. भाऊ घाबरला. त्याने काळजीपोटी माझ्या अंगावर जाड सतरंजी टाकली, त्यामुळे खूप मधमाश्या त्याच्या अंगावर गेल्या आणि मी वाचले. त्या सतरंजीच्या आत डोळ्यात, कानात जाणाऱ्या मधमाश्या मला दिसत होत्या. थोड्या वेळाने माझी शुद्धच हरपली. माझ्या बहिणी सांगतात ..किती तरी वेळ नंतर त्या माझ्या अंगावरील अडकलेले डंख काढीत होत्या. सर्वात मोठ्या भावाने तर अगदी चक्क विदेशी बनावटीचा नवीन सुंदर कॅमेरा फेकून दिला. माणसाला प्राणापेक्षा अधिक काय प्रिय असू शकते हे जाणवले.

त्या दिवशी आमच्या ड्रायव्हरची कमाल होती. स्वतःला वाचवित, कारमध्ये शिरलेल्या असंख्य  मधमाश्यांना टॉवेल गुंडाळलेल्या एका हाताने सावरीत, एका हाताने स्टीयरिंग व्हील  धरीत, त्या टेकडीवरून हळूहळू कारचा पहिला, दुसरा गियर बदलत चढणे, उतरणे किती अवघड ..घृ घृ करत कार कशीबशी वर चढत होती .खूप लांबवर आल्यानंतर त्या मधमाश्या कमी झाल्यात. हळूहळू दिसेनाश्या .. असे वेगवेगळे अनुभव कधी गमतीशीर तर कधी भयावह.
पण जीवन शिकविणारे. गरजेचे.

पुढील अंकी समापन ]

–  ©️ सौ.स्वाती वर्तक,
खार (प), मुम्बई ४०० ०५२.
swati.k.vartak@gmail.com



Tale of Three Baolis


Baolis, or baoris, or vavs, or step-wells, are underground water sources that have been popular in India from the ancient times, especially in the dry areas of this subcontinent. These step-wells generally consisted of two parts, a rectangular tank or kund, and a circular well that extended down to reach the water table. The well provided potable water for drinking, while the tank or kund was primarily used for bathing, washing, and watering crops. During summers the baolis with attached rooms also served as cool resting places for the pilgrims, passing caravans, and other travellers. These architectural marvels were generally commissioned by members of the royal families or by wealthy patrons, for the benefit of the common people.

While varying in style, where the baolis could vary from a L-shaped structure, to a rectangular one, to a circular form, they showed some common features too, such as a flight of stairs that led from the ground level to the water below. Many baolis built under Hindu patronage also served as temples that had figures of gods, goddesses, and animals; shaded pavilions with trabeate columns; corbelled domes; and elaborate carvings. Baolis under Islamic patronage had less ornamentation, no human or animal forms, and had the true domes and arches. In the later periods, often both styles were fused. Both types had circular wells for potable water, where a pulley system was sometimes used for drawing water.

The earliest step-wells in India were first seen in the 3rd century CE. These were basic in architecture, and were designed more out of necessity to store monsoon rain waters for use during the arid summer months. It was necessary to have a year-round water supply, especially in the dry north-western parts of India. Over the centuries, the basic baoli forms gave way to complex architectural structures. According to the historians, by early 19th century there were several thousand step-wells, built on various scales, thriving in India.  However, by the early 20th century, only few baolis remained in functional condition, as the British viewed these structures as unhygienic. So they were often filled in, or simply destroyed. Besides this, modern technology brought in plumbing lines and the tap water system that made baolis redundant. Currently the government has started with the preservation and conservation of baolis that still remain, marking them as heritage/ancient monuments.

untitled-1

Abhaneri or Chand baoli built in 8th -9 th CE in Rajasthan beside the Harshad Mata temple. The arched upper parts are clearly a later addition, while it is likely that the lower parts which show trabeate form of columns and niches are a part of the orginal structure of the baoli.

Dholpur baoli (Rajasthan)

Hidden behind the Ghazra ka tomb, is this pretty red sandstone 19th centory baoli. The structure, though unknown to most that visit this little town, is unique for its beautiful double pillars and delicate arches that surround its long rectangular tank and a circular well at the back. Hemmed in by buildings on all sides, the structure looks better conserved  than the neighbouring Ghazra ka tomb, though in terms of cleanliness much needs to be done. The tank water, as usual, remains dirty, though the well water appeared clean.

dsc_0038

the Dholpur baoli- surrounding residences and unclean waters of the tank fail to dim its unique beauty

dsc_0032

unique double pillars and delicate arches are the main attractions of the Dholpur baoli

dsc_0043

the well at the back, which is double-storied

dsc_0048

the circular pattern of the well (the arches show distinct Mughal influence)

dsc_0047

the circular well water looks relatively clean

Gwalior fort step-well (Madhya Pradesh)

Inside the Gwalior fort is a step-well, situated on the left side as one enters the palace complex gates. It is a single, circular, deep well, situated beside a many-pillared hall, which earlier held a shiva-lingum that was thrown down the fort walls by Emperor Jahangir, later to be discovered by a peasant tilling his grounds, and is now placed inside a temple outside the fort gates.

dsc_0321

entrance gate to the baoli (note the arches) within the Gwalior fort

dsc_0333

The circular baoli with its mossy green waters. There is a pillared passage that runs round the well. The entrance to the well is closed, with the steps plastered off to stop people from reaching the waters down below.

dsc_0334
The circular baoli with pillared hall at top

Raniji ki baoli at Bundi (Rajasthan)

Raniji ki baoli is a beautiful step-well, situated in Bundi. According to the signboard outside the baoli complex, the story goes that in late 16th century the king of Bundi married Rani Nathavati, as his previous queen failed to produce an heir. Rani Nathavati in due course gave birth to a son, which led to the previous queen turning envious. After placing her son under custody of the elder queen, Rani Nathavati devoted her entire life in caring for her subjects, wherein she built this step-well in 1699. The baoli has beautiful carvings mainly of elephants and is 46 meters deep. It has high-arched gates with niches for various deities.  At the entrance is a gate comprising of four tall pillars, joined beautifully at the top by elephant figures on beams and S –shaped (ogee) slender arches (brackets).

dsc_0115

The gate as one enters the Raniji ki baoli. Beautiful elephants and S-shaped arches adorn it

dsc_0106

the intricately carved arch above the tank water, with two elephants serving as brackets at two corners. The arches are distinctly Mughal influenced

dsc_0108

the well wall at the back, with an imposing arch and a small passage in the foreground separating the well from the tank in front

dsc_0107

deities carved in niches on the well wall at the back

dsc_0111

figures of elephants carved on the passage (balcony) wall that separates tank from well

dsc_0117

intricately carved elephant (with a mahout on its back) serving as a bracket in Raniji ki baoli

dsc_0116

delicate carvings on the four pillared gate at the entrance

(This article was published on Virasat E Hind)


 

राजस्थानातल्या जवाई बांध आणि बेरा, बीकानेर, आभानेरीची चांद बावली

 https://chinmaye.com/2020/03/05/mabhaneri/

1 Vote


Chand Baoli, Abhaneri

विहीर म्हणजे पाण्याचा साठा करण्यासाठी जमीन खोदून बांधून काढलेली सोय. पण भारतीय स्थापत्य परंपरेत विहीर बांधत असताना उपयुक्ततेच्या पलीकडे जाऊन केलेला व्यापक विचार हा बारव स्थापत्य रूपात विकसित झालेला दिसतो. खोलवर केलेलं दगडी बांधकाम, विविध आकारात रचना केलेला तलविन्यास आणि पाण्याच्या पातळीपर्यंत जाता यावं यासाठी केलेली पायऱ्यांची रचना. या सगळ्याचं भौमितीय सौंदर्य अनुभवायचं असेल तर बारव पाहायला हवी. इंग्लिशमध्ये या रचनेला step well तर हिंदीत बावली असं म्हंटलं जातं. गुजरातमध्ये पाटण येथे राणी की वाव या नावाने प्रसिद्ध असलेल्या विहिरीतील नाजूक नक्षीकाम आणि शिल्प सौंदर्याने या रचनेला विश्व वारसा स्थळाचा दर्जा दिला आहे. अशाच बारवांची मालिका राजस्थान, मध्य प्रदेश, महाराष्ट्र राज्यात दिसते. राजस्थानमध्ये माझी फिल्म शूट करत असताना मी पाहिलेली एक सुंदर बारव म्हणजे आभानेरी येथील चांद बावली …

निकुंभ घराण्यातील राजा चांद किंवा चंद्र याने ८-९ व्या शतकात आभानेरी किंवा आभानगरी येथील आपल्या राज्यात ही विहीर बांधली. या विहिरीची खोली सुमारे १९.५ मीटर आहे. या आयताकृती विहिरीच्या तीन बाजूंना पायऱ्यांची सुंदर रचना आहे तर चौथ्या बाजूला जणू महालच बांधावा त्याप्रमाणे छज्जे आणि दरवाजे आहेत. विहिरीच्या चारही बाजूंना संरक्षक भिंत असून उत्तर दिशेला दरवाजा आहे.

या रचनेत सुमारे 3500 पायऱ्या आहेत आणि १३ मजली बांधकाम केले गेलेले दिसते. राजा चांद हा गुर्जर प्रतिहार घराण्यातील शासक असावा आणि या घराण्याच्या उत्कर्ष काळात या बारवेची बांधणी झाली असे इतिहासकार सांगतात.

3500 steps at Abhaneri

या परिसरात एक प्राचीन मंदिरही आहे जे हर्षत माता मंदिर म्हणून ओळखले जाते आणि सुमारे १२ वर्षे जुने बांधकाम मानले जाते. स्थानिकांच्या मते गझनीच्या महंमदाच्या हल्ल्यात या मंदिराचे बरेच नुकसान केले गेले.

Harshal Mata temple

या मंदिराची जुने अवशेष वापरून पुनर्बांधणी केली असावी असं वाटतं. इथलं कोरीवकाम आणि शिल्पेही आवर्जून पाहावीत अशीच आहेत.

या मंदिराची जुने अवशेष वापरून पुनर्बांधणी केली असावी असं वाटतं. इथलं कोरीवकाम आणि शिल्पेही आवर्जून पाहावीत अशीच आहेत. दिल्ली-आग्रा-जयपूर या पर्यटन त्रिकोणात असलेलं हे ठिकाण जयपूर आणि आग्रा महामार्गाजवळच आहे. आमेर किल्ला, हवामहल, आग्रा किल्ला, ताजमहाल अशी भटकंती करत असताना आभानेरी सारखी अद्भुत ठिकाणे सुद्धा नक्कीच पाहिली गेली पाहिजेत.

सुंदर, आलिशान राजवाडे, मंदिरं, अन्य ऐतिहासिक वास्तू आणि अभयारण्य असलेल्या राजस्थानात देश-विदेशातून लाखो पर्यटक येत असतात. राजस्थान म्हटलं की आपल्या नजरेसमोर येतं थरचं वाळवंट आणि त्यात संचार करणारे उंट. कला, संस्कृती, अनेकविध रंगांची उधळण करणारे उत्सव यामुळंही राजस्थानची ख्याती जगभर पसरलेली आहे. अशाच सुंदर राजस्थानामधलं एक सुंदर शहर आहे बीकानेर. वायव्य राजस्थानात वसलेलं बीकानेर शहर राजस्थानामधलं एक महत्वाचं पर्यटन केंद्र आहे.

बीकानेरच्या परिसरामध्ये आढळणारा लाल आणि पिवळा वालुकाश्म आणि उंट या गोष्टी या शहराला खास ओळख प्रदान करून देत आहेत. तिथं आशियामधलं सर्वात मोठं उंट संवर्धन केंद्र आहे. जुन्या बीकानेरमधील अनेक घरं लाल वालुकाश्मातच बांधलेली आहेत. त्यावरूनच या शहराला राजस्थानचं लाल शहर असं नाव पडलेलं आहे. बीकानेर शहरामध्ये आणि त्याच्या आसपास अनेक पर्यटक ठिकाणं आहेत.

राव बिका राठोड यांनी 1488 मध्ये बीकानेर राज्याची स्थापना केली होती. जोधपूर शहराचे संस्थापक राव जोधा राठोड यांचे ते सर्वात ज्येष्ठ सुपुत्र. तोपर्यंत या परिसराला जंगलदेश म्हणून ओळखलं जायचं. त्याच्याही पूर्वी प्राचीन काळापासून मध्य आशिया आणि गुजरातदरम्यानच्या व्यापारी मार्गावरचं ते एक महत्वाचं शहर बनलं होतं.

देश्नोकच्या कर्णी मातेच्या आशीर्वादानं राव बिका यांनी या शहराची स्थापना केली होती. कर्णी मातेचं देश्नोकमधलं मंदिर जगातलं असं एकमेव मंदिर आहे, जिथं उंदराला पवित्र मानलं जातं आणि त्यांची पूजा केली जाते. त्यामुळे या मंदिरात प्रवेश करताच सगळीकडे उंदरांचा मुक्त संचार दिसतो. हे मंदिर बीकानेरपासून साधारण 33 किलोमीटर अंतरावर वसलेलं आहे. बीकानेरचे महाराजा गंगा सिंग यांनी या मंदिराला दान केलेला चंदेरी दरवाजाही इथं पाहायला मिळतो. गंगा सिंग यांनीच बीकानेर राज्यामध्ये सिंचनासाठी गंगा कालवा बांधला होता.

बीकानेरमध्ये असलेला जुनागढ किल्ला अतिशय भव्य आणि सुंदर आहे. याच्या बांधणीत लाल वालुकाश्म आणि संगमरवराचा प्रामुख्यानं वापर करण्यात आलेला आहे. जुन्या शहरापासून काहीच अंतरावर उत्तर दिशेला राजा राज सिंग यांनी हा किल्ला बांधला होता. याच्या भोवतीनं खोल खंदक खोदलेला आहे. सुरज पोल हे या किल्ल्याचं मुख्य द्वार. या किल्ल्यात असलेल्या हर मंदिरामध्ये राजघराण्याचे विवाह सोहळे आणि जन्म सोहळे पार पडत असत.

जुनागढ किल्लात अनुप महाल, करण महाल, बिजाई महाल, डुंगर निवास, गंगा निवास आणि रंग महाल असे महत्वाचे राजवाडे आहेत. पण चंद्र महाल आणि फूल महाल हे या किल्लामधले सर्वात सुंदर आणि आकर्षक राजवाडे आहेत. या महालांमध्ये सजावटीसाठी आरसे, बारीकबारीक कलाकुसर, चित्रकला यांचा वापर केलेला आहे. यामुळं या महालांचं अंतर्गत सौंदर्य अगदी खुलून गेलं आहे. त्याचबरोबर उंच स्तंभ, कमानी यांचाही या महालांच्या बांधकामात समावेश करण्यात आलेला आहे. म्हणूनच या किल्ल्याला भेट देणं हा अतिशय सुंदर अनुभव ठरू शकतो.

लालगढ राजवाडा हे बीकानेरमधलं आणखी एक खास आकर्षण आहे. लाल वालुकाश्मात उभारलेला हा राजवाडा महाराजा गंगा सिंग यांनी आपल्या वडिलांच्या – महाराजा लाल सिंग -स्मृतिप्रीत्यर्थ बांधला होता. याचं बांधकाम 1902 ते 1926 दरम्यान करण्यात आलं होतं. या राजवाड्यात लाल वालुकाश्मावर करण्यात आलेली कलाकुसर अप्रतिम आहे. त्याचबरोबर जुनी छायाचित्रं आणि इतर साहित्याचाही मोठा संग्रह या राजवाड्यात पाहायला मिळतो, जो भोजन कक्षात मांडण्यात आलेला आहे. राजवाड्याच्या बाहेरच्या हिरवळीवर नाचणारे बरेच मोर पाहणं हेसुद्धा रोमांचक ठरतं. त्यांच्यामुळं लालगढ राजवाड्याच्या सौंदर्यात भर पडली आहे. या राजवाड्याच्या काही भागाचं हॉटेलमध्ये रुपांतर करण्यात आलं आहे. तरीही त्याचं मूळ रुप बदलण्यात आलेलं नाही.

गंगा सुवर्ण महोत्सव संग्रहालयात हडप्पा-पूर्व संस्कृतीत वापरल्या जाणाऱ्या वस्तू पाहायला मिळतात. गुप्त आणि कुशाण काळामधल्या वस्तूही तिथं मांडलेल्या आहेत. याबरोबरच अनेक सुंदर शिल्पकृती तिथं पाहायला मिळतात. टेराकोटा, चिनी मातीच्या वस्तू, चित्रं, जुनी हत्यारं आणि जुन्या नाण्यांचा संग्रहही तिथं आहे. बीकानेरच्या परिसरातील खास कला आणि कलाकुसरीच्या वस्तूंचा खजिना विशेष दालनात मांडलेला आहे.

देवी कुंड ही बीकानेरमधली शाही घराण्याची स्मशानभूमी आहे. बीकानेर शहरापासून हे ठिकाण 8 किलोमीटरवर आहे. बीका घराण्यामधल्या राजांच्या स्मरणार्थ तिथं अनेक छत्र्या उभारण्यात आलेल्या आहेत. त्यातील महाराजा सुरत सिंग यांच्या छत्रीच्या छतावर राजपूत पद्धतीची चित्रकला केलेली पाहायला मिळते.

बीकानेरच्या आसपास अनेक उद्याने आणि अभयारण्ये आहेत. गंगा निवास सार्वजनिक उद्यान आणि प्राणिसंग्रहालय, रतन बिहारी मंदिर उद्यान, भवन राजवाडा उद्यान आणि गजनेर अभयारण्य ही सर्वाधिक लोकप्रिय आहेत. गजनेर अभयारण्यात गच्च झाडी असून तिथं नीलगायी, चिंकारांचं मोठ्या प्रमाणात वास्तव्य आहे. या अभयारण्यातच गजनेरचा राजवाडा वसलेला आहे. पूर्वी बीकानेरचे महाराजा याचा वापर उन्हाळी निवासस्थान म्हणून करत असत. या अभयारण्यामधल्या एका तळ्याच्या किनाऱ्यावर हा राजवाडा बांधलेला आहे. आता त्याचं हॉटेलमध्ये रुपांतर करण्यात आलं आहे.

अशा या सुंदर आणि वैशिष्ट्यपूर्ण बीकानेर शहराला पुन्हा एकदा भेट देण्याची इच्छा आहेच. दुर्दैवानं त्यावेळच्या ट्रीपमध्ये काढलेले जवळजवळ सगळेच फोटो खराब झाले आहेत. त्यामुळं इथं फारसे फोटो टाकता आले नाहीत. मागच्यावेळी एका सहल कंपनीमार्फत गेल्यामुळं दीड-दोन दिवसांमध्ये बीकानेर पाहताना गडबड झाली होती. आता मात्र गेलो तर स्वतंत्रपणेच जाईन. म्हणजे सगळं शांतपणे बघता येईल आणि नव्यानं फोटोही टिपता येतील.

 
 

अनेकदा संगमेश्वर फिरलेल्यांनाही हे ठिकाण माहीत नसतं. प्राचीन जलव्यवस्थापनाचं उत्तम उदाहरण इथे दिसतं.

(संग्रहित छायाचित्र)
(संग्रहित छायाचित्र)

आशुतोष बापट

कोकण म्हणजे अलिबाबाची गुहा आहे. इतका खजिना इथे दडलेला आहे की, शोधून शोधून दमायला होईल. एखादा परिसर सगळा बघून झालाय असं वाटेपर्यंत तिथलं काही तरी सुंदर आपल्यासमोर येऊन उभं रहातं आणि हे आधी कसं बघितलं नाही असं वाटून जातं. संगमेश्वरजवळचं सप्तेश्वरही अशाच सुंदर ठिकाणांपैकी एक. अनेकदा संगमेश्वर फिरलेल्यांनाही हे ठिकाण माहीत नसतं. प्राचीन जलव्यवस्थापनाचं उत्तम उदाहरण इथे दिसतं.

मुंबई-गोवा महामार्गावर शास्त्री नदीवरील पूल ओलांडून आपण संगमेश्वरकडे जातो. डावीकडे रस्ता कसबा संगमेश्वरला जातो. तिकडे न वळता संगमेश्वरकडे जायचे. जरा पुढे गेल्यावर उजवीकडे मुळ्ये हॉस्पिटल आहे आणि त्याच्याच समोर डोंगरावर रस्ता चढलेला दिसतो. चांगला डांबरी सडक आहे. त्या रस्त्याला चांगलाच चढ आहे. डोंगरावर चढणारा रस्ता सागाच्या जंगलातून जातो. अंदाजे ३ कि.मी. गेल्यावर ओढय़ावरील पुलावर रस्त्याला दोन फाटे फुटतात. उजवीकडे ऐन गर्द झाडीत आहे सप्तेश्वर महादेवाचे मंदिर.

डावीकडचा रस्ता देवपाट वस्तीकडे जातो. काही अंतर चालत गेल्यावर भक्कम बांधणीचे मंदिर दिसते. मंदिराच्या बाजूनेच पाण्याचा प्रवाह वाहतो आहे. मंदिराच्या प्राकाराला भिंत बांधून बंदिस्त केलेले आहे. जसे आपण प्रांगणात प्रवेश करतो आपल्यासमोर इथला खजिना उघडलेला दिसतो. आपल्यासमोर एक पाण्याचे कुंड दिसते. त्याच्या मागे अजून एक कुंड आहे आणि त्याच्या मागे चिऱ्याच्या दगडातले सुंदर बांधकाम नजर खिळवून ठेवते. दोन बाजूंना खोलीसारखे बांधकाम आणि मधल्या बांधकामाला ५ खिडक्या. या बांधकामात चुन्याचा

वापर केलेला आहे. चुन्याच्या घाणीचे दगडी चाक आजही तिथे दिसते. अलकनंदा नदीचा उगम इथेच डोंगरावर होतो. त्याचे खाली येणारे पाणी इथे सात प्रवाहांत विभागून ते परत मोठय़ा कुंडात सोडले जाते. सात प्रवाहांचा स्वामी तो ‘सप्तेश्वर’ अशी साधी सोपी व्याख्या. बाजूच्या दोन खोल्यांचे प्रयोजन समजत नाही. त्यांच्या डोक्यावर शिखरासारखे साधे बांधकाम केलेले आहे; पण याच्या पाठीमागे जाऊन पाहिले तर डोंगरावरून आलेला प्रवाह विशिष्ट चॅनेलमधून आणला आहे. प्रत्येक खिडकीपाशी त्याला ‘टी सेक्शन’सारखे बांधकाम करून प्रवाहित केलेला आहे. जिथे तो जोडलेला आहे तिथे एक चौकोनी खड्डा केलेला आहे. अतिशय सुबक आणि उत्तम तंत्रज्ञान वापरून हे जलव्यवस्थापन केलेलं दिसतं. या सर्व सातही खिडक्या आतून एकमेकांना सलग जोडलेल्या आहेत. त्यांच्या कमानी एका रेषेत सरळ दिसतात. या सगळ्या स्थापत्यावर इस्लामिक स्थापत्य कलेचा प्रभाव प्रकर्षांने जाणवतो. मध्ययुगीन काळात हे जलव्यवस्थापन केलेलं आहे. शिवाय हे सगळं बांधकाम देखणंसुद्धा आहे. समोरच्या बाजूला प्रत्येक खिडकीच्या वर व्यालासारखा एक काल्पनिक पशू कोरलेला दिसतो. त्याशिवाय पानाफुलांची सजावट केलेली दिसते. बाजूला आणि डोक्यावर लहान-लहान कोनाडे आहेत. कदाचित तिथे उजेडासाठी पणत्या ठेवत असावेत. या सातही विभागांतून वाहणारे सगळे प्रवाह पुढच्या बाजूला एकत्र येऊन एका गोमुखातून मोठय़ा कुंडात पडतात. ३० फूट लांबी रुंदीच्या कुंडात आत उतरायला पायऱ्या केलेल्या आहेत. स्वच्छ आणि निवळशंख असे हे पाणी इथून जमिनीखालून दुसऱ्या कुंडात जाते आणि ते कुंड भरले की तिथून पुढे एका ओढय़ाला जाऊन मिळते. हाच ओढा पुढे गावात जातो.

सप्तेश्वर शिवमंदिर पश्चिमाभिमुख आहे. ऐसपैस सभामंडप आणि मोठा गाभारा असे याचे स्वरूप. गाभाऱ्याच्या दरवाजावर गणपतीची सुंदर मूर्ती. मंदिराला लागूनच वैजनाथाचे एक छोटेसे मंदिर आहे. हा सगळा परिसर अतिशय शांत आणि रमणीय आहे. अव्याहत वाहणाऱ्या महामार्गाजवळ डोंगरावर इतके रम्य ठिकाण असेल असे चुकूनही वाटत नाही. इथून आजूबाजूचा मोठा परिसर दृष्टिक्षेपात येतो. पूर्वेकडे सह्य़ाद्रीची मुख्य रांग  आणि खाली दरीत कसबा संगमेश्वर परिसर, तिथली मंदिरे, मुख्यत्वे करून काळभैरव मंदिर आणि तिथे जाणारा रस्ता हे सगळे फार सुंदर दिसते. आंबा, साग, ऐन, शिवण, फणस अशा वृक्षांची दाटी असलेला हा परिसर फारच सुंदर आहे. इथून खरोखरच पाय निघत नाही.

कर्णराजाच्या पदरी असलेल्या कविराज शेषाने ‘संगमेश्वर माहात्म्य’ हा ग्रंथ लिहिला आहे. या ग्रंथात तो संगमेश्वर परिसराचे माहात्म्य आणि तिथल्या ठिकाणांचे वर्णन करतो. त्यात त्याने सप्तेश्वराचा उल्लेख केलेला आहे. तसंच परिसरात कोणकोणती देवळे आहेत याचंही वर्णन ‘संगमेश्वर माहात्म्य’मध्ये शेषाने दिलेलं आहे. या ग्रंथात कविराज या स्थानाचे श्रेष्ठत्व वर्णन करतो. त्या ग्रंथात कर्णेश्वर मंदिराच्या देखभालीसाठी नेमून दिलेल्या गावांची नावं येतात. त्यात धर्मपूर (आजचे धामापूर), शिवनी (शिवने), धमणी (धामणी), लवल (लोवले), तुर्वरी (तिवरे) अशी गावे दिसतात. सप्तेश्वरपासून वाहणारी अलकनंदा आणि वरुणा या नद्यांच्या संगमावर कसबा इथे कर्णेश्वराचे शिल्पसमृद्ध शिवालय उभे आहे. दगडी बांधणीचे हे शिवालय आणि त्यात असलेली शिल्पकला बघण्यासारखी आहे. मंदिराचे खांब आणि मुख्यत्वे मंदिराच्या पोर्चचे छत आणि त्याच्या द्वारशाखा फारच अप्रतिम आहेत. पोर्चवर अष्टदिक्पालांचे केलेले शिल्पांकन अफाट आहे. दरवाजावर शेषशायी विष्णू आणि त्याचे दशावतार बघत राहावेत असे आहेत. कर्णेश्वर मंदिर परिसरसुद्धा रमणीय आहे. परिसरात काही प्राचीन मंदिरांचे अवशेष आजही पाहायला मिळतात. कसबा गावात असलेले काशीविश्वेश्वर आणि काळभैरव मंदिर आणि त्याच्या शेजारी असलेले प्रचंड मोठे पाण्याचे तळे आवर्जून पाहावे. संगमेश्वर माहात्म्यात हे क्षेत्र भक्ती आणि मुक्ती देणारे आहे, तसेच याच्याभोवती सर्वत्र शक्तीची स्थळे आहेत. याच्या अष्टदिशांना आठ तीर्थे आहेत असे उल्लेख येतात. सप्तेश्वर मंदिर पाहून खाली कसबा संगमेश्वरी यावे किंवा उलट करावे; पण ही दोन्ही ठिकाणे बघणे अनिवार्य आहे.

निसर्गाचा वरदहस्त लाभलेले हे नितांत रमणीय ठिकाण संगमेश्वराच्या डोंगरावर ऐन झाडीत दडलेले आहे. इतक्या उंचावर मुद्दाम केलेले प्राचीन जलव्यवस्थापन आणि या रमणीय परिसरात मिळणारी शांततेची अनुभूती घेण्यासाठी कोकणात दडलेला हा खजिना आवर्जून पाहायला हवा.
 
 
 
 
 
 
 
www-esamskriti-com.translate.goog

Step wells of Maharashtra


  • हम बावड़ियों को गुजरात और राजस्थान से जोड़ते हैं। रोहन काले और उनकी टीम द्वारा चलाए गए महाराष्ट्र बावड़ी अभियान की बदौलत अब हम जानते हैं कि राज्य के विभिन्न क्षेत्रों में कम से कम 1,750 बावड़ियाँ हैं। ये पानी की कमी को दूर कर सकती हैं और हमारी राष्ट्रीय विरासत का हिस्सा हैं।

माफ़ कीजिए, क्या आस-पास कोई पुराना कुआँ है..? सीढ़ियों वाला कुआँ। अम्म... असल में कुआँ तो नहीं, लेकिन एक पुराना तालाब है जिसकी कुछ सीढ़ियाँ टूटी हुई होंगी... वो उस बड़े आम के पेड़ के नीचे है... ये रास्ता सीधा पेड़ तक जाता है... रुको, मेरे साथ आओ। रास्ता साफ़ नहीं है और जंगल से होकर जाता है। तुम उसे आसानी से नहीं ढूँढ पाओगे...

वाह, कमाल है। बहुत बड़ा है। चार प्रवेश द्वार और आला भी कमाल का है... आप इसका इस्तेमाल क्यों नहीं करते? गर्मी के मौसम में भी इसमें काफ़ी पानी रहता है... आपको इसका इस्तेमाल करना चाहिए... वरना ये इतिहास बन जाएगा। ये सिर्फ़ एक तालाब नहीं है... ये हमारी विरासत है। इसे संभाल कर रखना हमारा फ़र्ज़ है।

महाराष्ट्र में 1500 से ज़्यादा बावड़ियाँ हैं। अगर हम हर बावड़ी को पुनर्जीवित और संरक्षित करें, तो महाराष्ट्र में पानी की कमी की समस्या हमेशा के लिए हल हो जाएगी । अगर हम अभी से इसकी शुरुआत कर दें, तो हमारी समृद्ध विरासत आने वाली पीढ़ियों के लिए बची रहेगी।

यह बातचीत रोहन काले, मनोज सिंकर और महाराष्ट्र के एक साधारण ग्रामीण के बीच है। उन्होंने कई परित्यक्त बावड़ियों की खोज की और उन्हें गूगल मैप पर सार्वजनिक रूप से प्रदर्शित किया। बावड़ियों को पुनर्जीवित करने के अपने जुनून के लिए रोहन काले ने अपनी कॉर्पोरेट नौकरी छोड़ दी। छह महीने तक उन्होंने पूरे महाराष्ट्र में लगभग 14,000 किलोमीटर की साइकिल यात्रा की। उन्होंने 400 बावड़ियों की खोज की और उनका दौरा किया और गूगल मैप पर उनके सटीक जीपीएस स्थानों को रिकॉर्ड/नोट किया। महत्वपूर्ण बात यह है कि उन्होंने कई लोगों को बावड़ियों के संरक्षण की आवश्यकता के बारे में आश्वस्त किया और इस संरक्षण परियोजना में कई और लोगों को शामिल किया।

इस तरह "महाराष्ट्र बावड़ी अभियान" की शुरुआत हुई। रोहन हमेशा कहते हैं, "यह मेरा निजी अभियान नहीं है, यह महाराष्ट्र की जनता का अभियान है।"

इस अभियान के तहत अब तक 1,750 से ज़्यादा बावड़ियों का मानचित्रण किया जा चुका है । यह अभियान कई उद्देश्यों को लेकर शुरू किया गया था ।

1. अनुसंधान और संरक्षण उद्देश्यों के लिए महाराष्ट्र में बावड़ियों का सबसे बड़ा और सबसे विश्वसनीय डेटाबेस बनाना।

2. हजारों बावड़ियों की पहचान करना (जीपीएस निर्देशांक प्राप्त करना और उन्हें सार्वजनिक दृश्य के लिए कस्टम गूगल मानचित्र पर मैप करना)।

3. बावड़ियों की तस्वीरें/ड्रोन शॉट लेना।

4. बावड़ियों के वास्तुशिल्प डिजाइन के अध्ययन के लिए कॉलेजों के साथ सहयोग करना।

5. स्वच्छता अभियान का आयोजन करना।

6. बावड़ियों के संरक्षण के लिए लोगों और सरकार के साथ सहयोग करना।

7. ग्रामीणों/स्थानीय विरासत अन्वेषकों को अद्वितीय बावड़ियों को पर्यटक आकर्षण के रूप में पहचानने के लिए प्रोत्साहित करना।

8. छात्रों के लिए निःशुल्क अध्ययन भ्रमण का आयोजन।

9. अन्य गांवों/राज्यों को प्रेरित करने के लिए संबंधित गांव के स्थानीय लोगों/प्राधिकारियों द्वारा बावड़ियों के संरक्षण में किए गए अच्छे कार्यों को सोशल और प्रिंट मीडिया के माध्यम से साझा करना।

10. बावड़ियों के लिए पारिस्थितिक जल शोधन प्रणाली विकसित करना।

11. महाराष्ट्र की जल कमी की समस्या का समाधान और विरासत संरक्षण महाराष्ट्र बावड़ी अभियान का प्राथमिक दृष्टिकोण है ।

इन बावड़ियों का पुनरुद्धार और संरक्षण केवल इस अभियान में लगे स्वयंसेवकों का ही नहीं, बल्कि सभी का कर्तव्य है। स्वयंसेवक इसके लिए कड़ी मेहनत कर रहे हैं। उनके प्रयासों का ही परिणाम है कि महाराष्ट्र पर्यटन विकास निगम (एमटीडीसी) ने अपनी वेबसाइट पर बावड़ियों के लिए एक अलग पृष्ठ बनाया है। विभिन्न जिलों में कई बावड़ियों का पुनरुद्धार किया गया है और युवा आगे आकर इस कार्य में रुचि दिखा रहे हैं। सोशल और प्रिंट मीडिया इस अभियान की पहुँच बढ़ाने में मदद कर रहे हैं। वे नियमित रूप से प्रकाशित करते हैं कि कैसे लोग और प्रशासन किसी एक बावड़ी के पुनरुद्धार में मदद करते हैं।

पिछली महाशिवरात्रि पर, महाराष्ट्र बाराव दीपोत्सव के तहत, पूरे महाराष्ट्र में लगभग 160 बावड़ियों को दीपों से सजाया गया। यह दीपोत्सव हमेशा चलता रहेगा। रानी अहिल्यादेवी होल्कर की जयंती पर, धुले के शिरपुर गाँव के लोगों ने एक पाँच मंजिला बावड़ी को दीपों से सजाया। उन्होंने एक व्याख्यान और सांस्कृतिक कार्यक्रम का भी आयोजन किया।

महाराष्ट्र बाराव दीपोत्सव.

बावड़ी सिर्फ़ पानी का स्रोत नहीं होती। इसकी वास्तुकला भी अलग होती है। कुछ बावड़ियाँ इतनी छोटी होती हैं कि एक शयनकक्ष में समा सकती हैं, जबकि कुछ में एक पूरी इमारत समा सकती है। कई डिज़ाइन... कुछ बावड़ियाँ कच्ची होती हैं, कुछ पक्की। महाराष्ट्र में हमें 125 साल से लेकर 1200 साल पुरानी बावड़ियाँ मिल जाएँगी। यह वास्तुकला और सिविल इंजीनियरिंग, दोनों के अध्ययन की एक अलग शाखा है, इतिहास के छात्रों और इतिहासकारों के लिए भी। टूरिस्ट गाइड या टूर अरेंजर्स बावड़ी पर्यटन के रूप में अपने व्यवसाय का विस्तार कर सकते हैं। इससे स्थानीय लोगों और विरासत खोजकर्ताओं को मदद मिलेगी। इससे पर्यटन को बढ़ावा मिलेगा और रोज़गार के अवसर पैदा होंगे।

अरे, लेकिन बावड़ी का असली मतलब क्या है ? माफ़ कीजिए, मैं समझाना भूल गया। मुझे बताना ही होगा कि बावड़ी क्या होती है? इसे कैसे पहचाना जाता है? यह कितने प्रकार की होती है?

बावड़ी का अर्थ है एक कुआँ या पानी की टंकी जिसमें पानी तक पहुँचने के लिए सीढ़ियाँ होती हैं। सिंधु घाटी सभ्यता में कुओं के प्रमाण मिलते हैं। बिजली या डीज़ल से चलने वाले पंप के आविष्कार से पहले, लोग रहट (पानी की बाल्टी खींचने के लिए हाथ से चलने वाली लकड़ी की चरखी), पाय रहट (पानी की बाल्टी खींचने के लिए पैर से चलने वाली लकड़ी की चरखी), और बैल रहट (पानी की बाल्टियों की श्रृंखला खींचने के लिए बैल द्वारा चालित पहिए वाली चरखी) का इस्तेमाल करते थे। बावड़ी यात्रियों, ग्रामीणों, व्यापारियों और कृषि के लिए उपयोगी थीं। शायद यही बावड़ियों के जन्म का एक प्रमुख कारण था। कम ऊर्जा की खपत में सीधे पानी तक पहुँचा जा सकता है।

कई शासक राजवंशों ने बावड़ियाँ बनवाईं। सातवाहनों से लेकर चालुक्य, छत्रपति शिवाजी महाराज, छत्रपति शाहू महाराज, पेशवाओं, रानी अहिल्यादेवी होल्कर और कई परोपकारी धनी लोगों ने इन बावड़ियों का निर्माण करवाया। कुछ बावड़ियों पर शिलालेख खुदे हुए हैं ताकि हम उनकी आयु और इतिहास जान सकें।

मराठी में हर शैली के लिए अलग-अलग नाम हैं जैसे बरव, कुंड , पुष्करिणी , पोखरण, घोडेबाव, पांडव कालीन / शिवकालीन विहार, कटलखोद विहार आदि। अंग्रेजी में इन्हें स्टेप वेल और स्टेप टैंक के नाम से जाना जाता है।

बावड़ी की पहचान कैसे करें ? हर क्षेत्र की वास्तुकला की अपनी अलग शैली होती है। आइए हर क्षेत्र पर एक नज़र डालें।

मैं अपने गृह क्षेत्र कोंकण से शुरुआत करना चाहूँगा । कोंकण में आपको तीन प्रकार के डिज़ाइन देखने को मिलेंगे। घोडेबाव का अर्थ है लेटराइट चट्टानी सतह पर खुदा हुआ एक कुआँ जिसके एक तरफ सीढ़ीनुमा प्रवेश द्वार होता है। ये पूरे क्षेत्र में पाए जाते हैं। दूसरे प्रकार के कुंड पुराने मंदिरों के पास पाए जाते हैं। और तीसरा, पोखरण या पुष्करणी सार्वजनिक जल आपूर्ति के लिए बनाया गया एक केंद्रीय जलाशय है।

कोंकण क्षेत्र में सीढ़ीदार कुएँ।

ऊपर बाईं ओर से। पहली बावड़ी गणपतिपुले मंदिर के पास है। इसके तीन प्रवेश द्वार हैं। वर्तमान में केवल मुख्य बड़ा प्रवेश द्वार ही उपयोग में है। इस बावड़ीनुमा तालाब की मंदिर प्रशासन द्वारा नियमित रूप से सफाई की जाती है। मंदिर लगभग 500 वर्ष पुराना है, इसलिए यह बावड़ीनुमा तालाब भी उतना ही पुराना हो सकता है। कोंकण के कई गाँवों में 120 से 500 वर्ष पुराने मंदिर हैं और लगभग हर मंदिर का अपना कुआँ या बावड़ीनुमा तालाब है।

इन तालाबों का मुख्य उद्देश्य धार्मिक अनुष्ठानों और पूजा-अर्चना के लिए जल उपलब्ध कराना है। रत्नागिरी, रायगढ़, ठाणे और सिंधुदुर्ग जिलों में कई कुंड हैं; जिनमें से अधिकांश मंदिरों के हैं और इसलिए वे अभी भी जीवित हैं और संरक्षित हैं या उपयोग में लाए जाते हैं।

चित्र में दूसरा कुआँ समतल लैटेराइट सतह पर खोदा गया है। इस प्रकार के कुओं का स्थानीय नाम घोडेबाव है , जिसका अर्थ है कि घोड़ा पानी में उतर सकता है। इनमें से कुछ कुएँ कच्चे हैं और कुछ पक्के, कुछ बड़े लैटेराइट पत्थरों से बनी दीवारों से सुरक्षित हैं। ये बावड़ियाँ सड़क के किनारे हैं। (नीचे चित्र देखें) पुराने ज़माने में, वाहनों के आविष्कार से पहले, लोग जलमार्गों का इस्तेमाल करते थे, पैदल या समुद्री यात्रा करते थे। और व्यापार मार्ग बंदरगाहों और घरों को जोड़ते थे। यात्राएँ लंबी होती थीं, ज़्यादातर लोग पैदल चलते थे, कुछ लोग गाड़ियों में यात्रा करते थे। इसलिए रास्ते में बावड़ियाँ बनाई जाती थीं जो प्यासे इंसानों और जानवरों को राहत देती थीं।

यह बिल्कुल स्पष्ट है कि उन रास्तों का इस्तेमाल मुख्य सड़कों के रूप में किया जाता था। 'पशुओं के चलने के रास्ते मानव पथों में विकसित हुए और आगे चलकर राजमार्ग बन गए।' ये दिखने में साधारण सी बातें मानव विकास के एक पहलू पर प्रकाश डाल सकती हैं।

तीसरी और चौथी (मध्य पंक्ति के दाईं ओर) तस्वीरों में दिख रहे कुएँ भी छोटे कुंड हैं। तीसरी तस्वीर में दिख रहा कुंड शायद सबसे नया बावड़ी (125-130 साल पुराना) है। मध्य पंक्ति में बाईं ओर की तस्वीर कोंकण में पाए जाने वाले दुर्लभ प्रकार की है। यह एक विशेष रूप से निर्मित केंद्रीय जलाशय है और खेती के लिए उपयोग किया जाता है।

भौगोलिक परिस्थितियों के अनुसार बावड़ियों के निर्माण की शैली भी बदलती रहती है। महाराष्ट्र के हर जिले में हर प्रकार की बावड़ियाँ मिल जाएँगी, लेकिन उनका आकार, प्रयुक्त सामग्री और भंडारण क्षमता अलग-अलग होती है।

रत्नागिरी में आपको ज़्यादातर चट्टानी मैदानों में खोदे गए घोड़ेबाव मिलेंगे। सिंधुदुर्ग में ज़्यादा कुंड हैं। ठाणे में दोनों प्रकार के कुंड हैं, लेकिन इस्तेमाल की गई सामग्री अलग है। पहली तस्वीर में दिख रही बावड़ी बदलापुर में स्थित है, जिसकी तलहटी तक दीवारें बनी हुई हैं। नीचे दी गई दूसरी तस्वीर सप्तेश्वर मंदिर, संगमेश्वर के पास है और प्राचीन काल में इस क्षेत्र के गौरव का प्रतीक है।

बदलापुर बावड़ी.

सप्तेश्वर बावड़ी.

अब पश्चिमी महाराष्ट्र की ओर चलते हैं । इसमें अहमदनगर, पुणे, सांगली, सतारा और कोल्हापुर जैसे आधुनिक ज़िले शामिल हैं। इन ज़िलों का एक लंबा इतिहास रहा है और ये कई राजवंशों के सत्ता केंद्र रहे हैं। इसलिए आपको यहाँ हर तरह की बावड़ियाँ, जैसे L, Z, U, T आकार की बावड़ियाँ, पोखरण, पुष्करिणी, कुंड, देखने में आकर्षक और ज़्यादा परिष्कृत संरचनाएँ देखने को मिलेंगी।

पश्चिमी महाराष्ट्र में बावड़ियाँ

नीचे दी गई पंक्ति में सबसे ऊपर और दाईं ओर की बावड़ी पर एक नज़र डालें। इसके किनारे पर खड़ा एक आदमी बावड़ी की विशालता को दर्शाता है। कोंकण को ​​छोड़कर महाराष्ट्र में हर जगह कुओं की सीढ़ियाँ बहुत गहरी बनाई गई प्रतीत होती हैं (घोड़ेबाव को छोड़कर)।

नीचे की पंक्ति में सबसे दाईं ओर - यह बावड़ी जेजुरी क्षेत्र में, बल्लालेश्वर मंदिर के बगल में स्थित है। देखिए, यह कितनी आकर्षक और परिष्कृत है। जल आपूर्ति के प्रमुख उद्देश्य के बावजूद, इस क्षेत्र के कुओं की विशेषता उनकी भव्यता और सुंदरता है। इन कुओं का आकार संभवतः इतना बड़ा होगा कि ये कई लोगों, सेना, प्राचीन तीर्थस्थलों और यहाँ आने वाले श्रद्धालुओं की पानी की ज़रूरतों को पूरा कर सकें।

निचली पंक्ति में बीच की तस्वीर में सबसे सुंदर प्रकार की बावड़ी है - पुष्करिणी । घंटों इसके किनारे बैठकर इसकी सुंदरता का आनंद लीजिए। पुष्करिणी की दीवारों पर ज्यादातर आले होते हैं। कभी-कभी देवी-देवताओं की सुंदर मूर्तियां होती हैं या ब्राह्मण (पुजारी) द्वारा धार्मिक अनुष्ठान करने के लिए आला खाली छोड़ दिया जाता है। आप पुष्करिणी पर सुंदर कलाकृतियां देख सकते हैं। मंचर की बावड़ी पर एक शिलालेख उत्कीर्ण है जो बताता है कि इसका निर्माण 14वीं शताब्दी में हुआ था। चूंकि ये जिले लंबे समय तक कई राजवंशों के शक्ति केंद्र थे, इसलिए कई कलाकार यहां रहे, इसलिए आपको एल, जेड, यू, टी जैसे विभिन्न आकार की बावड़ियां मिल सकती हैं। सबसे बाएं खंड में चित्र एल आकार की बावड़ी दिखाता है।

कोल्हापुर शहर में एक खूबसूरत Z आकार की बावड़ी है, दुर्भाग्य से मेरे पास इसकी तस्वीर नहीं है। साथ ही 2 या 3 या अधिक प्रवेश द्वार वाली बावड़ियाँ यहाँ आमतौर पर देखी जाती हैं। लिम्ब बारा मोटेची विहिर के पास बावड़ी वास्तुकला का एक सुंदर उदाहरण है। आप पानी में कदम रख सकते हैं, पानी निकालने के लिए 12 मोट (बैलों द्वारा खींची जाने वाली रस्सी वाली बाल्टी) भी देख सकते हैं और अगर आपको बस एक शांत जगह चाहिए, तो कुएं में उतरें। आश्चर्यजनक रूप से, प्राकृतिक एयर कंडीशनिंग के साथ एक छोटी सी हवेली बनी हुई है। इसका निर्माण 1719-1724 (स्रोत विकिपीडिया) में पास के 300 आम के बागानों को पानी की आपूर्ति के लिए किया गया था। एक आम शहर का निवासी होने के नाते मुझे पता है कि 300 आम के पेड़ों को कभी भी इतने बड़े कुएं की जरूरत नहीं होती

इतने बड़े, भव्य कुओं के पीछे एक कारण यह है कि इन्हें किसने बनवाया और उन्होंने कितना पैसा खर्च किया?

मराठवाड़ा में बावड़ियाँ : इसमें औरंगाबाद, जालना, परभणी, हिंगोली, नांदेड़, बीड, लातूर और उस्मानाबाद जिले शामिल हैं। यहाँ कई बावड़ियाँ हैं। शिवलिंग या अश्व कुएँ के आकार की बावड़ियाँ इस क्षेत्र में कुछ ही हैं। चारों ओर कलात्मक रूप से निर्मित सीढ़ियों वाले, जिनमें पैदल चलना सुविधाजनक है, कुएँ बड़ी संख्या में देखे जा सकते हैं।

मराठवाड़ा में बावड़ियाँ

वास्तविक गहराई चाहे जो भी हो, तालाब बहुत छोटा है, जबकि आसपास का काम ज़्यादा जगह घेरता है और बहुत ही परिष्कृत दिखता है। इनके निर्माण में अलग-अलग रंगों के पत्थरों का इस्तेमाल किया गया है। इनके बड़े आकार का श्रेय पड़ोसी राज्यों कर्नाटक और तेलंगाना के प्रभाव को दिया जा सकता है।

मराठवाड़ा क्षेत्र में पानी की कमी के कारण ही इतनी बड़ी सीढ़ियाँ बनाई गई हैं, और ये सभी सार्वजनिक लाभ के लिए हैं। ये आमतौर पर चार या पाँच सीढ़ियों के सेट के साथ बनाई जाती हैं, जिनके बाद विशाल चबूतरे होते हैं। द्वारों की संख्या और शैली अलग-अलग होती है। लेख में दिए गए चित्र इन संरचनाओं की विविधता को बखूबी दर्शाते हैं।

ऊपर बाईं ओर की तस्वीर में दिख रही बावड़ी में कई तरह की सीढ़ियाँ हैं। बगल में दिख रही गोलाकार सीढ़ियों वाली बावड़ी महाराष्ट्र में अपनी तरह की इकलौती बावड़ी है। परभणी जिले के वलूर में स्थित यह बावड़ी कई वर्षों से ज़मीन के नीचे दबी पड़ी थी। स्थानीय लोगों ने इसकी खुदाई की और इस तरह एक सुंदर संरचना सामने आई। सबसे नीचे दाईं ओर की तस्वीर में दिख रही बावड़ी के तल पर आठ छोटे मंदिर हैं। ये तीर्थ हैं , यानी पुजारियों और साधुओं के लिए यज्ञ जैसे अनुष्ठान करने हेतु जगह छोड़ी गई कुएँ। ऐसे कुओं का पानी पवित्र माना जाता है।

पूरे मराठवाड़ा क्षेत्र ने इस अभियान में व्यापक जनभागीदारी दिखाई है। क्षेत्र के युवाओं ने कई बावड़ियों की सफाई की और उन्हें पुनर्जीवित किया, जिनका उपयोग वर्षों से केवल कूड़ा-कचरा डालने के लिए किया जाता रहा था। ये हमारी विरासत के महत्वपूर्ण प्रतीक हैं। हमने इनमें विभिन्न वास्तुकला और संस्कृति का प्रभाव भी देखा।

विदर्भ की बावड़ियाँ : आइए अब चलते हैं बहुमंजिला बावड़ियों की अद्भुत दुनिया की ओर। ये इतनी खूबसूरत हैं कि कोई इन्हें अच्छी तरह से बनी इमारतें समझने की भूल कर सकता है।

विदर्भ में बावड़ियाँ

विदर्भ में बावड़ियाँ.

बावड़ी पर्यटन में अपार संभावनाएँ हैं। महाराष्ट्र में लगभग हर प्रकार की बावड़ी पाई जाती है, और उनका आकार भी अपेक्षाकृत बड़ा होता है। घोड़ों के लिए कुएँ, जो आमतौर पर कोंकण शैली में बनाए जाते हैं, यहाँ तीन मंजिला संरचना के रूप में दिखाई देते हैं। अगर पुराने ज़माने में कोई पहरेदार होता था, तो वह राहगीरों को पानी पीने और ऊपरी मंजिल पर आराम करने के लिए कहता होगा।

ये विशाल बावड़ियाँ ईंटों से बनी हैं, कभी-कभी लाल या काले पत्थरों से। मेहराबों, प्रवेशद्वारों (तीन तरफ़) और दो मंज़िला ताखों पर कमल के चित्र उकेरे गए हैं। हम इनके काल, नक्काशी का वर्ष और रचयिता का नाम, जो कभी-कभी किसी पद्य में भी मिलता है, देख सकते हैं।

मराठवाड़ा और विदर्भ क्षेत्रों में बावड़ियों का इतिहास चालुक्यों या अहिल्यादेवी होल्कर के शासनकाल, 18 वीं शताब्दी से जुड़ा है। इस समय की बावड़ियाँ खानदेश क्षेत्र में भी पाई जाती हैं। नीचे विशाल बावड़ियों के चित्र देखें। ये बावड़ियाँ विदर्भ (अर्थात् बुलढाणा, वाशी, अकोला, अमरावती, यवतमाल, वर्षा, नागपुर, भंडारा, गोंदिया, गढ़चिरौली, चंद्रपुर आदि आधुनिक ज़िलों) से हैं।

खानदेश में बावड़ियाँ

इस क्षेत्र में बावड़ियों की स्थिति और भी बेहतर हो सकती थी। लेकिन हमारे अभियान की बदौलत उनकी सफाई और जीर्णोद्धार में तेज़ी आई है। वर्षों से पानी की कमी झेलने के बाद, स्थानीय लोगों को बावड़ियों के महत्व और लाभ का एहसास हो रहा है। आज युवा इस अभियान में और भी बढ़-चढ़कर हिस्सा ले रहे हैं। एक तरह से यह अभियान की सफलता का प्रतीक है।

विदर्भ के अलावा, खानदेश (नासिक, धुले, जलगाँव, नंदुरबार ज़िले) में भी बहुमंजिला बावड़ियाँ हैं। धुले ज़िले में एक पाँच मंजिला बावड़ी की खोज हुई है (ऊपर खानदेश की तस्वीर में, यह तस्वीर के बाईं ओर वाली बावड़ी है)। यह संभवतः महाराष्ट्र की सबसे ऊँची ज्ञात बहुमंजिला बावड़ी है। पिछले मई में अहिल्यादेवी होल्कर की जयंती के अवसर पर, इसे अद्वितीय प्रकाश व्यवस्था से सजाया गया था। एक पालकी यात्रा और एक व्याख्यान का आयोजन किया गया था।

सुझाव : इस अभियान में भाग लेने के लिए किसी को अपनी नौकरी छोड़ने की ज़रूरत नहीं है। ज़रूरत है तो अपने गाँवों और कस्बों के कुओं की सफाई और संरक्षण की। हमें जीर्णोद्धार के दौरान मूल संरचना को नष्ट करने और अनावश्यक सौंदर्यीकरण से बचना चाहिए। पुरातत्व विभाग या प्राचीन संरचनाओं की विधि जानने वाले किसी व्यक्ति से परामर्श करना बेहतर है। प्रशासनिक एजेंसियों की मदद से शिवकालीन जलापूर्ति और कुआँ संरक्षण जैसी योजनाओं के अंतर्गत परियोजनाओं को क्रियान्वित करने का प्रयास करने की सिफ़ारिश की जाती है।

'शून्य अपशिष्ट' के साथ बावड़ी पर्यटन को बढ़ावा देना एक लक्ष्य हो सकता है। इससे बावड़ी संरक्षण अभियान का विचार फैलेगा और राज्य में जल संकट की समस्या का समाधान भी हो सकता है।

लेखक श्रीरंग महाराष्ट्र बावड़ी अभियान का एक प्रमुख हिस्सा हैं। ईसंस्कृति इस लेख को लिखने और तस्वीरें साझा करने के लिए उनका आभारी है। हम श्री रोहन काले का भी आभार व्यक्त करते हैं । महाराष्ट्र की बावड़ियों के बारे में अधिक जानने के लिए उनकी वेबसाइट देखें।

भारत भर के बावड़ियों के एल्बम देखें

1. चांद बावड़ी जयपुर

2. हम्पी जल प्रणाली , कर्नाटक

3. बूंदी, राजस्थान की बावड़ियाँ

4. रानी-का-वाव पाटन , गुजरात

5. अदालज-वाव अमदावद, गुजरात

6. कन्नूर, केरल

7. पन्ना मीना-का-कुंड जयपुर

8. स्टेप-वेल पेनुकोंडा किला, आंध्र प्रदेश

9. मेलुकोटे, कर्नाटक में पानी की टंकी या कल्याणी

पानी की कमी की समस्या को हल करने के लिए आधुनिक तकनीक को हर संभव तरीके से अपनाएँ। साथ ही, अपने पूर्वजों से सीखने के लिए खुले और तत्पर रहें। जैसा कि टीम रोहन काले ने दिखाया है, हम बहुत कुछ सीख सकते हैं।

यह भी पढ़ें

1. मंदिरों/तालाबों में बावड़ियाँ क्यों होती हैं?

2. भारत में जल संचयन के पारंपरिक रूपों का उत्थान और पतन

3. ओरछा में बावड़ी के पानी का सिंचाई के लिए उपयोग

4. एरिस, कैस्केडिंग टैंकों की एक प्रणाली

5. प्राचीन भारत ने जल संसाधनों की विरासत को कैसे संरक्षित किया - अच्छा लेख।

6. भारत का जल से गहरा नाता

7. अनुपम मिश्रा द्वारा TED टॉक - जल संचयन की सरलता 18 मिनट वी.जी.

8. नौल और धार - हिमालय की एक सांस्कृतिक विरासत

9. जल संचयन के पारंपरिक रूप और प्रयोज्यता

प्रसिद्ध बावड़ियों/पानी के टैंकों/कुंडों की कुछ तस्वीरें। ये हमेशा मंदिरों के पास पाए जाते हैं।

कुंड वेरीनाग, जम्मू और कश्मीर झेलम नदी का स्रोत है।

रानी-की-वाव, पाटन, गुजरात

मेलुकोटे, कर्नाटक।

जयपुर के निकट चांद बावड़ी।

पेनुकोंडा किला, आंध्र प्रदेश।

अहमदाबाद, गुजरात के पास अदालज-वाव



अडालज की वाव - Adalaj Stepwell


अहमदाबाद पासून १८ किमी अंतरावर अडालज बावडी / वाव हा पुरातन हिंदू जल नियोजनाचा एक उत्कृष्ठ नमुना आहे. ही विहीर १४९८ साली बांधली गेली आहे आणि आज ही ह्या बांधकामात दिसणारे दगडी नक्षीकाम थक्क करून टाकतं. आपली अनेक प्रेक्षणीय स्थळे जशी लोकांनी रंगवून किंवा आपली नावं कोरून वगैरे खराब केलेली असतात तसे नशिबाने इथे काही झालेले दिसत नाही. गुजराथ प्रदेशात अश्या अनेक वाव आढळतात, ह्या चौफेर भटकंतीच्या ट्रीप मध्ये नवलाख वाव, बाबा हरेर कि वाव आणि अडालज वाव ह्या तीन स्टेपवेल बघता आल्या. पण ह्या तिन्ही विहिरीत अडालज ची विहीर कलेच्या दृष्टीने खूपच उजवी आहे. पाण्याचे व्यवस्थापन आणि जनतेस अथवा राजाघारण्यास पाण्याची उपलब्धता, ह्या कारणांनी ह्या अनेक विहिरी गुजराथ परिसरात बांधलेल्या आढळतात. आणि मग पुढे ह्या विहिरी थोड्या धार्मिक तर थोड्या अलंकारिक बनत गेल्या असाव्या 

अडालज कि वाव हि अहमदाबाद पासून जवळ आहे आणि इथे जायला अहमदाबाद पासून वाहतूक व्यवस्था आहे. शेअर रिक्षा पासून ते राज्य सरकारच्या बस वगैरे पर्याय आहेत पण सतत नाहीत. स्वत:चे वहान असल्यास उत्तम. अडालज विहीर, त्रीमंदीर, वैष्णावदेवी मंदिराची प्रतिकृती, इंदोरा नेचर पार्क आणि अक्षरधाम मंदिर असा एक दिवसाचा प्रोग्रॅम बनवता येतो. अक्षरधाम मंदिर शेवट ठेवल्यास रात्रीचा लाईट शो सुद्धा बघून अहमदाबाद मुक्कामी परत येऊ शकता. 

अडालज बावडी / वाव बघायची इच्छा खूप दिवस होती. त्या विहिरी च्या नक्षीकामाबद्दल ऐकलेलं होतं. तिथे पोचलो तेव्हा एक परदेशी लोकांचा ग्रुप तिथून आवक होऊन बाहेर पडत होता. त्यातला एक सांगत होता की असलं नक्षीकाम बघायला नशीब लागतं, बरं झालं आपण भारतात आलो. आणि मला आपल्या पर्यटन विभागाची पंच लाईन आठवली. “अतुल्य भारत” खरोखर मला ह्या देशात इतकं काही बघायला आणि तुप्त व्हायला आहे की एक जीवन पुरणार नाही. खरोखरीच हा अतुल्य भारत आहे. इतकं भावनिक व्हायला कारण आहे हि अडालज बावडी. हिंदू मुस्लिम कलेचा थक्क करणारा नमुना आहे ही विहीर. जमिनी खाली ५ माजली विहीर आणि ती ही एखाद्या प्रसादासारखी नटलेली आहे. 

ह्या अप्रतिम विहिरीचा इतिहास ही काही साधासुधा नाही ह्या विहिरीचे बांधकाम सुरु केलं ते राणा वीर सिंग ह्याने, पण ही विहीर पूर्ण होण्यापूर्वीच राणा वीर सिंग च्या राज्यावर सुलतानी आफत आली. ह्या राज्याला त्या वेळी नाव होतं दांडी देश आणि ह्या राणा वीर सिंग च्या राज्यावर हल्ला करणारा सुलतान होता महम्मद बेगडा, ज्याचं संपूर्ण नाव होतं अबुल नसीर-उद-दिन महम्मद शहा प्रथम, हा अत्यंत आक्रमक सुलतान होता. अहमदाबाद शहर वासवणाऱ्या अहमद शहा प्रथम चा हा नातू. सुलतान महम्मद बेगडा ने पुढे अनेक वर्ष गुजराथ प्रदेशावर राज्य केलं. स्वत:ला सुलतान अल-बर्र आणि सुलतान अल-बह्र अश्या पदव्या धरण करणाऱ्या ह्या सुलतानने त्याच्या पुढच्या राज्य कालावधीत अनेक अप्रतिम बांधकामं ही उभारली, त्यातले एक बांधकाम म्हणजे चंपानेर, जे आज UNESCO च्या संरक्षण यादीत आहे. जामी मस्जिद, सरखेज रोजा आणि अडालज वाहिरी चे उर्वरित काम ही अनेक बांधकामांपैकी काही बांधकामे ह्या सुलतानाच्या राज्यकालात झाली. 

राणा वीर सिंगशी झालेल्या युद्धात सुलतानाचा विजय झाला आणि राणा वीर सिंग ना युद्धात वीरगती प्राप्त झाली. राणा जी च्या पत्नी राणी रूपबा ह्या अत्यंत रूपवान होत्या आणि ती बातमी सुलतानाला समजल्यावर हा सुलतान राणीकडे लग्नाची मागणी करू लागला. अर्थात ती मागणी ही धमकीपेक्षा कमी नक्कीच नसणार. राणी ने अट घातली की तिच्या पती ने हाती घेतलेली अडालज विहीर जर सुलाताने पूर्ण केली तर ती लग्नाला संमती देईल आणि मग काय, हे अडलेलं काम अत्यंत वेगाने सुरु झालं. विहीर पूर्ण झाल्यावर राणी ने जातीने विहिरीची पाहणी केली, संत सज्जनांना विहिरीच्या पाण्यात स्नान करू देऊन ते पाणी पवित्र केलं आणि मग ह्यात विहिरीत उडी मारून जीव दिला. एक पतिव्रता स्त्री मरणापूर्वी गावकऱ्यांसाठी अमूल्य उपहार देऊन गेली आणि आपल्यासारख्यांना अभिमान देऊन गेली. राणीच्या आत्मदानाचा ह्या विहिरीशी संबध आहे. एका वीर राजपूत राणीच्या बलिदानाची साक्ष देत ही विहीर आज 500 वर्ष उभी आहे. 

विहिरीला तीन प्रवेश आहेत जे पहिल्या मजल्यावर एकत्र येतात. हा अष्टकोनी मजला आणि त्यात कोरलेल्या चार ग्यालाऱ्या दगडी नक्षीकामाने अक्षरश: भरून टाकल्या आहेत. संपूर्ण विहीर वाळूजान्य दगडापासून बनलेली आहे. विहिरीचे बांधकाम दक्षिणोत्तर केलेलं आहे. एकूण पाच माजले जमिनी खाली बांधले आहेत आणि खालच्या मजल्यावर पाण्याजवळ तापमान साधारण ५-6 डिग्री से कमी होतं. विहिरीची बांधणी करतांना सूर्य प्रकाश सरळ पाण्यावर पडणार नाही ह्याची काळजी घेतलेली आहे. वरील कथे प्रमाणे विहिरीचे बांधकाम हिंदू आणि मुसलमान दोन्ही राजवटीत झाल्याने त्याचा शिक्का विहिरीतील नक्षीकामांवर सहज दिसतो. विहीर केवळ पावसाचे पाणी साठवत नाही तर जमिनीतील पाण्याच्या साठ्यापर्यंत जाते. विहिरीत धार्मिक चिन्हे सुद्धा कोरली आहेत जेणेकरून विहिरीतील वातावरण पवित्रमय राहावे. 

विहिरीला लागून असलेल्या देवीच्या मंदिराचा गाभारा संपूर्ण रंगीत काचेच्या तुकड्यांनी सजवलेला आहे. आणि त्यात काही पौराणिक कथांचे दृश्यं बघायाला मिळतात

विहिरीच्या वरती काही कबरी सारखे बांधकाम बघायला मिळते. असं म्हणतात की महमद सुलतानानी विहिरीचे बांधकाम करणाऱ्या प्रमुख कारागिरांना अशीच अजून एक विहिरी बांधता येऊ शकते का ? असं विचारलं आणि त्यांनी होकार दिला. त्याचं बक्षिस म्हणजे ह्या त्यांच्या कबरी आहेत. पण हि केवळ एकीव कथा आहे.

ह्या अप्रतिम विहिरीला प्रवेश शुल्क नाही. विहीर सकाळी ८:०० ते संध्याकाळी ६:०० पर्यंत बघण्यास उघडी असते असं समजलं. तुमच्या अहमदाबाद प्रवासात जे चूकवी नये असे हे एक पर्यटन स्थळ आहे. 

 
 
 
 

No comments:

Post a Comment

मनसर

 प्रकार : गिरीदुर्ग जिल्हा : नागपुर उंची : १२०० फुट ...