Wednesday, June 22, 2022

नाणेघाट

  महाराष्ट्राचा इतिहास मौर्य सम्राट अशोकापासून सुरु झालेला दिसतो. त्याविषयी तात्कालीन पुराव्याबरोबत लिखीत पुरावे देखील सापडतात.सोपारा येथे मौर्यकालीन बौध्द स्तुपाच्या अवशेषाबरोबरच अशोकाचे शिलालेख देखील सापडले आणि महाराष्ट्राचा इतिहासकाळ इ.स.पुर्व २३०० वर्षापर्यंत मागे गेला. यानंतर महाराष्ट्राचे ज्ञात आद्य राजघराणे म्हणाजे सातवाहन घराणे ! इसवी सन पूर्व पहिल्या शतकात भारताच्या मोठ्या भूप्रदेशावर राज्य करणारा सातवाहन हे पहिले राजे. हा राजवंश सुमारेचार शतके सलगतेने राज्य करत होता. या काळात त्यांचे तीस पराक्रमी राजे होऊन गेले. या सातवाहनांच्या राजवटीत महाराष्ट्र इतर प्रदेशात सुवर्णकाळ होता असे मानले जाते. प्रतिष्ठान (पैठण), जीर्णनगर (जुन्नर), तगर (तेर), नेवासे, नाशिक अशी भरभराटीला आलेली शहरे या राजवटीत उदयास आली. अशा या सातवाहनांच्या राज्यात प्रवेश करण्यासाठी ‘नाणेघाट’ हा प्रमुख मार्ग होता.
येथील एका लेखात सातवाहनांच्या पराक्रमाशिवाय त्यांनी इथे केलेले यज्ञ, दानधर्माचे उल्लेख आहेत. सातवाहन राजांनी दोनदा अश्वमेध यज्ञ केला असे दिसून येते. याशिवाय वाजपेय यज्ञ, राजसूय यज्ञ असे तब्बल २२ यज्ञ इथे पार पडल्याची माहिती हे लेख देतात. हजारो गाई, शेकडो हत्ती, घोडे, खेडी, धान्य, वस्त्र-अलंकार आणि तत्कालीन सातवाहनांची कार्षांपण या नाण्यांचा मोठा दानधर्म केल्याचाही यात उल्लेख येतो.
       सातवाहनांना आंध्रभृत्य असे मानले जाते. त्यांत आंध्र मावळचा जो उल्लेख केला आहे ते म्हणजे मावळातील आंध्रा नदीचे खोरे.(सध्याचे आंदर मावळ) पण या उपपत्तीला कसलाही पुरातत्विय पुरावा अजून उपलब्ध झालेला नाही. पण हे आंध्रप्रदेशातील खचितच नव्हेत. कारण सातवाहनांचे आजवर जे जे शिलालेख उपलब्ध झालेले आहेत ते सर्व ब्राह्मी प्राकृतात आहे (अगदी आंध्र प्रदेशातले सुद्धा) त्यातला एकही अपवादात्मकरित्याही तेलगूत (द्राविडी भाषांमध्ये) नाही.
       या घराण्यातील अनेक राजांचे पुरावे नाणी,शिलालेख्,पुराणे ,प्राचीन साहित्य यामधून मिळते.परंतु या घराण्यातील राजांची राज्यवर्षे कोणती, या घराण्यात नक्की किती राजे होउन गेले याविषयी संशोधकात एकमत नाही. उपलब्ध पुराव्यानुसार केवळ सुरवातीचे आणि नंतरचे राजे असा क्रम लावता येतो.परंतु काही सातवाहन राजे सोडता इतर काही राजांचा इतिहास आणि वंशावळ अंदाजे मांडावी लागते,
   सिमुख ( श्रीमुख ) हा सातवाहन घराण्याचा संस्थापक राजा. सिमुकाचा काळ इ,स.पुर्व दुसरे शतक मानला जातो. याने पश्चिम आणि दक्षिण विदर्भात सातवाहनांची सत्ता स्थापन केली होती. सिमुखाची जी नाणी सापडली आहेत्,त्यात त्याचे नाव 'वासिठिपुत्त छिमुख ( वाशिष्ठीपुत्र सिमुक) असा येतो.नंतरच्या काळात लिहीलेल्या ग्रंथातून सिमुख सातवाहनाचा उल्लेख शिशुक असा होतो.श्रीसातकर्णि हा सिमुखाचा मुलगा तर नागनिका हि त्याची सुन होती.इ.स.पुर्व पहिले शतक हा या दोघांचा काळ मानतात.श्रीसातकर्णीने केलेला सिमुखाच्या राज्याचा विस्तार बघीतला तर त्यात अनेक महत्वाची शहरे होती असे लक्षात येते. महाराष्ट्रातील नाशिक्,जुन्नर्,प्रकाशे,नेवासे, पैठण्,अडम तसेच मध्यप्रदेशातील महेश्वर ,माळवा,विदीशा, त्रिपुरी इत्यादी शहरे त्याच्या अधिपत्याखाली होती. याशिवाय उत्तर कर्नाटकातही त्याचा विस्तार झाला असावा. श्रीसातकर्णीच्या आनंद नावाच्या मुकादमाने सांची येथील स्तुपासमोरच्या तोरण दान दिले होते हे सांची येथील लेखावरुन समजते.श्रीसातकर्णीने छपन्न वर्षे राज्य केले होते असे पुराणे सांगतात.याच्या राज्यवर्षाचा उल्लेख सांची अथवा नाणेघाट येथील लेखात येत नाही.परंतु २००७ साली चंद्रपुर येथे सापडलेल्या एका मातीच्या मुर्तीच्या मुद्रेवरील लेखात श्रीसातकर्णीच्या तिसाव्या राज्यवर्षाचा उल्लेख आहे.या मुद्रेवरील लेखात गावातील कापसावरील कराचा उल्लेख आहे.दोन हजार वर्षापुर्वी भारतातून रोमबरोबर चालणार्‍या व्यापारात महाराष्ट्रातून सुती कापड निर्यात केले जात असे.त्यादृष्टीने सातवाहनकालीन मुद्रेत नमुद केलेल्या कापसाच्या कराला महत्व आहे.
       श्रीसातकर्णीनंत वेदीसिरी,सतिसिरी,दुसरा सिमुक असे सातवाहन राजे होउन गेले. हे राजे मध्य प्रदेश्,महाराष्ट्र आणि तेलंगणाच्या काही भागात राज्य करत असावेत. कोटीलिंगला आणि विदर्भातील काही नाणी हि दुसर्‍या सिमुख सातवाहनाची असावीत असा अंदाज आहे. 
  पुढे सिमुख सातवाहनानंतर त्याचा मुलगा सातकर्णीने राज्यशकट सांभाळला. सातकर्णीच्या मृत्यूनंतर त्याचा मुलगा वेदश्री हा सत्तेवर आला, मात्र तो अल्पवयीन आल्याने त्याची आई नागनिका हीच राज्यकारभार बघत होती असे दिसते. नागनिका हि अतिशय मुत्सदी आणि कर्तबगार होती. तीने [पतीच्या मृत्युमंतर अल्पवयीन मुलाचे संगोपन करुन सातवाहनांचे साम्राज्य राखले. यावरुन त्याकाळी समाजकारणात आणि राजकारणात देखील महत्वाचे स्थ्यान होते.अगदी सातवाहन राजे आपल्या आईचे नाव आधी लावत होते.सातकर्णी प्रमाणेच नागनिका सुद्धा धार्मिक वृत्तीची होती. ती स्वतःहा यज्ञदीक्षादिकात निष्णात असून तिने आपल्या पती सोबत अश्वमेध, राजसूय, गवामयन, गर्गत्रिरात्र, अंगिरसामन, अंगिरसातिरात्र, शततिरात्र अश्या अनेक यज्ञांमध्ये उत्साहाने सहभाग घेतलेला होता. अश्वमेध यज्ञाची स्मृती म्हणून सातकर्णीचे व नागनिकेचे जोड नाणे चलनात होते. त्याच्या एकाबाजूला ' रजो सिरी सतकनिस ' तर दुसऱ्या बाजूला ‘नागनिका’ अशी नावे स्पष्ट कोरलेली आहेत. तिचा पुत्र वेदश्री राज्यकारभार करण्यालायक झाल्यावर तिने आपले आयुष्य व्रतवैकाल्यांना वाहून घेतल्याचे व एका तपस्वीनी सारखे जीवन जगल्याचे दिसते. तिला पतीनिधनासमावेत पुत्र निधनाचे दुःख सुद्धा सहन करावे लागले. कारण तिचा जेष्ठपुत्र भायल व कनिष्ठ पुत्र सातवाहन हे अल्पयीन असतानाच मरण पावले होते.
           नाणेघाट येथील लेणे हे नागनिका हिनेच कोरलेले आहे.यासंदर्भात लेण्यामध्ये शिलालेख ही कोरुन घेतला आहे. त्यात कोरलेल्या लेखात नागनिका ही सातकर्णी राजाची भार्या असून, स्कंदश्री याची माता होती, अंगिकुलवर्धन वंशातील महारथी त्रणकयिरा याची कन्या होती, असे नमूद केले आहे. तिला 'नागवरदायिनी ', ' मासोपवासिनी’, ‘गृहतापसी’, ‘चरितब्रह्मचर्या’, अशी विशेषणे लावलेली आहेत. यावरून तिचा दिनक्रम हा वैराग्यपूर्ण होता असे दिसते. सम्राज्ञी नागनिकेने केलेले कृत्य डोळ्यासमोर रहावे म्हणून नाणेघाटासारख्या व्यापारी मार्गावर हा शिलालेख कोरला असावा. 
    नागनिका ही अत्यंत जिद्दीची व मानी स्त्री असल्याचे तिच्या नाणेघाटातील लेखावरून दिसते. फक्त शिलालेख नव्हे तर या लेण्यात सातवाहन घराण्यातील व्यक्तींच्या प्रतिमाही कोरुन घेतल्या होत्या. या पुतळ्यांमध्ये सातकर्णीच्या प्रतिमेच्या आधी नागनिकेची प्रतिमा कोरण्यात आलेली दिसते. सातवाहन घराण्यातील तिचे महत्त्वाचे स्थान स्पष्ट करण्यासाठी तिची प्रतिमा राजा सिमुक याच्या नंतर खोदलेली आहे. याच लेण्यात तिच्या दोन पुत्रांच्या प्रतीमांनंतर तिच्या पित्याची प्रतिमा कोरलेली आहे. सातवाहन कुळात आपल्या पित्याची प्रतिमा कोरणारी ही इतिहासातील बहुदा पहिलीच राणी असावी. पित्याच्या प्रतीमेखाली ‘अंगियकुलवर्धन सागरवलयांकित पृथ्वीवरील श्रेष्ठ वीर’ असे बिरूद ही कोरलेले आहे. यावरून तिचा दराराही स्पष्ट होण्यास मदत होते. 
             या सातवाहन कुलाचे कौतुक 'त्रिसमुद्रतोयपीत वाहन' असे केले आहे.याचा अर्थ तीन समुद्रांचे तोय म्हणजे पाणी पिणारे असा होतो. 
     सच्च भण गोदावरि पुव्वसमुद्देण सहिआसंती सालाहणकुलसरिसं जइ ते कुले कुल अत्थि ||'
 गाथा सप्तशतीमधील हा कवी विचारतो, 'गोदामाई तु पश्चिम पर्वतात उगम पावून पुर्वसागरापर्यंत वाहत जातेस.पण खर सांग तुझ्या या दोन सागराच्या पल्ल्यात सातवाहनांसारखे एक तरी यशस्वी घराणे आहे का ?'
     सातवाहनांनी महाराष्ट्रात पहिली राजसत्ता सुमारे बावीसशे वर्षांपूर्वी स्थापन केली. त्यांची राजधानीची व प्रमुख नगरे होती जुन्नर, नाशिक, प्रतिष्ठान व तेर ही. त्या नगरांचे संबंध देशाच्या इतर भागांबरोबर व कोकण किनारपट्टीच्या सोपारा, ठाणे, कल्याण, चौल, मांदाड इत्यादी बंदरांमधून ग्रीस, रोम, इजिप्त, आफ्रिकेचा पूर्वकिनारा, इराणी व अरबी आखातातील प्रदेश यांच्याशी होते. प्राचीन काळी सुपारक म्हणजेच सोपारा आणि कल्याण ही पश्चिम किनाऱ्यावरची दोन अत्यंत महत्त्वाची बंदरे होती. केवळ देशांतर्गत नव्हे तर परदेशाशी व्यापार येथुन होत असे. कल्याण-नाणेघाट-जुन्नर-नगर-पैठण हा महाराष्ट्रातील प्राचीन व्यापारी मार्ग होता. या मार्गावरून फार मोठ्या प्रमाणावर वाहतूक चालत असे. त्या काळी जगभरातील व्यापारी सोपारा-कल्याण बंदरावर आपला माल घेऊन येत असत. हा माल घोडे-खेचर अथवा बैलावर लादुन सातवाहनांची राजधानी असलेल्या प्रतिष्ठान नगरीत व्यापारासाठी नेला जाई.तारवे, विविध प्रकारचा माल आणत व घेऊन जात. व्यापार्‍यांच्या तांड्यांना सार्थवाह म्हणत.आल्यागेलेल्या मालाचे संकलन व वितरण कोकणातून घाटमाथ्यावर व नंतर महाराष्ट्राच्या अन्य भागांतून होई. सह्याद्रीच्या प्रचंड भिंती त्यांच्या वाटा अडवत.  सह्याद्री लंघून पुढे जाण्यासाठी ठिकठिकाणी या दुर्गम भिंतींतून घाट खोदण्यात आले. त्यामुळे सह्याद्रीत लहानमोठे घाट दोन हजार वर्षांपूर्वीच अस्तित्वात आले. ते कोकण व घाटमाथा यांना जोडत. कोकणातील ठाण्याचा भाग थळ, बोर, माळशेज व नाणे या घाटांमुळे घाटमाथ्याला जोडलेला होता. महाराष्ट्रात सुमारे दोन हजार वर्षापूर्वीपासून दळणवळणासाठी कोकणातून घाटावर जाणाऱ्या घाटवाटा सह्याद्रीच्या कडेकपारीत अनेक ठिकाणी आढळतात. तत्कालीन राजांनी व्यापारासाठी हे घाटरस्ते तयार केल्याचे दिसून येते. यापैकी नाणेघाट, माळशेज, अहुपे, गायधारा हे घाट व्यापारी वाहतुकीसाठी दगडांनी बांधण्यात आले होते. सध्या या घाटांपैकी बहुतेक घाट कोसळले आहेत तर काही बंद आहेत. आजही सह्याद्रीच्या पायथ्याजवळील स्थानिक लोक या घाटवाटांचा वापर करतात. यापैकी सर्वात महत्वाचा तो नाणेघाट. कारण हा घाट जोडतो तो सातवाहनाची उपराजधानी असलेल्या जुण्णनगर उर्फ जुन्नरला व त्यापुढे तो थेट पोहोचतो ते त्यांच्या वैभवशाली राजधानीला. प्रतिष्ठानला. आताच्या पैठणला. साहजिकच हा घाट सह्याद्रीच्या इतर सर्व घाटांपेक्षाही जास्त वहिवाटीचा त्यामुळेच सर्वोत्तम  बांधणीचा. पाण्याची विपुल टाकी असलेला. म्हणून त्यास घाटांचा राजा म्हटले जाते. रस्ते-रेल्वे-विमाने यांच्या आधुनिक काळात नाणेघाटाचं महत्त्व कदाचित समजणार नाही; पण सव्वादोन हजार वर्षांपेक्षा कित्येक राजवटी, व्यापारी, सत्तांतरे, व्यापारी, देशोविदेशांचे वाटसरू, गुरेढोरे, सुखदुःखे आणि संस्कृती अनुभवलेली ही घळी.

  सोपारा ते प्रतिष्ठाण असा चालणार्‍या या व्यापार्‍यावर नियंत्रण मिळवून कररुपी महसुल मिळवायचा तर जुन्नरवर ताबा मिळवणे सातवाहनांना गरजेचे होते. सातवाहन राजा गौतमीपुत्र सातकर्णी याने शकांचा नाश करून जुन्नर परिसरावर आपले वर्चस्व प्रस्थापित केले. जुन्नरचा उल्लेख एका शिलालेखात जुन्नीनगर असा केलेला आहे,गेल्या काही वर्षात जुन्नरमध्ये झालेल्या उत्खननात सातवाहनकालीन घरांचे अवशेष, खापरे, शंखापासून बनवलेल्या बांगड्या मिळालेल्या आहेत.
     या सातवाहन राजांनी इ.स.पुर्व २५०ते इ.स.२५० या कालखंडात सुमारे सव्वादोन हजार वर्षापूर्वी जुन्नरजवळ  सह्याद्रीचा उभ्या कड्यातील एक घळ फोडून हा घाट तयार केला गेला. छिन्नी, हातोडा या साधनांनी इथल्या भिंती तासल्या गेल्या त्यांच्या खुणा येथे आजही स्पष्ट दिसतात. तेच दगड इकडे पायर्‍यांसारखे रचले गेले. वळणावळणांवर दगडांचेच बुरुज रचले गेले. तहानलेल्या वाटसरूंसाठी ठिकठिकाणी पाण्याची टाकी  खोदण्यात आली. दगडी रांजण उभारण्यात आला. घाटावर चौकीची ठिकाणे निर्माण करण्यात आली. एव्हढा महत्वाचा घाट असल्यामुळे त्याच्या संरक्षणासाठी अनेक किल्ले उभारण्यात आले. यात कुकडी नदीच्या खोऱ्यात जिवधन, चावंड, हडसर, निमगिरी, शिवनेरी किल्यांची निर्मिती केली. जीवधन सगळ्यात जवळचा साथीदार. सार्थवाह, बौद्ध भिक्षू यांच्या विश्रांतीसाठी इथले अनेक डोंगर कोरून लेणी बनवण्यात आल्या. जुन्नर परिसरात महाराष्ट्रातील सर्वाधिक लेण्या आहेत. तर असा हा प्राचीन अत्यंत वर्दळीचा घाटमार्ग.








नाणेघाटाची विवीध रुपे

    हा घाट मुरबाडच्या पूर्वेस ३० कि.मी. कल्याणपासून ६४ कि.मी. तर जुन्नरपासून ३० कि.मी. अंतरावर आहे. मुरबाडवरून निघाल्यावर सह्याद्रीच्या तळाशी वैशाखरे व पुलुसोनाळे ही गावे येतात.नाणेघाटाची लांबी सुमारे ३ मैल आहे व घाटाची नळी सुमारे २५० फुट लांब व ८ फुट रुंद आहे. नाणेघाटाच्या पायथ्याला वैशाखरे, प्रधानपाडा व पुलू सोनाळे ही गावे आहेत.पुलू सोनाळे या गावाजवळून कणिकेर नावाची नदी वाहते आणि याच परिसरात लेण्यांचा आणखी एक समुह आहे.
    वैशाखरे गावाची व्युत्पत्ती गझेटियरमध्ये वैश्यगृह (व्यापारी गृह) अशी दिलेली आहे. ते गाव व्यापाऱ्यांचा, लमाणांचा, बौद्धभिक्षूंचा व इतरेजनांचाही घाट चढण्याआधीचा पडाव असावा. घाट चढल्यावर घाटघर लागते. घाटाची चढण प्रधान पाड्यापासून वैशाखऱ्याजवळ सुरू होते. ती घनदाट वनस्पतींच्या भागातून सुमारे साडेचार किलोमीटर अंतर कापून घाटघरजवळ शिंगरू पठारावर येऊन संपते. चढणीच्या शेवटच्या टप्प्यात एकशेतीस फूट लांबीची प्रस्तर घळ असून तिला 'घाटाची नळी' असे म्हटले जाते. तो सबंध प्रस्तर खोदून त्यातून वाट काढण्यात आली आहे. ते अभियांत्रिकीतील त्या वेळचे अवघड आव्हान असावे. सातवाहनांनी तो घाट वैशाखरेपासून घाटघर व पुढे जुन्नरपर्यंत कातळ फोडून, त्यात पायर्‍यांची सोय करून बांधलेला होता. त्या पायर्‍यांचे अवशेष पाहण्यास मिळतात.
        घाटात अनेक सोयी पुरवण्यात आल्याचे दिसून येते. शिंगरू पठार व पुलु सोनाळ्याजवळ गणेशथाळ येथे दगडात रांजण खोदलेले आहेत. स्थानिक लोक त्या रांजणांना 'जकातीचे रांजण' असे म्हणतात. लमाण व्यापार्‍यांकडून घाटाचा वापर केल्याबद्दलचे शुल्क किंवा कर आकारण्यात येत असावा.हा कर नाणेघाटाच्या तोंडाशी असलेल्या दगडी रांजणात गोळा केला जाई असा एक समज आहे. घाटघर व आजुबाजूचे रांजण हे नेहमीप्रमाणे उभट गोलाकार आहेत. मात्र गणेशथाळजवळील रांजण आकाराने चौकोनी आहे. ते सर्व रांजण जकातीसाठी वापरण्यात येत असतील असे वाटत नाही. ती व्यवस्था पांथस्थांना पिण्याचे पाणी मिळावे म्हणूनही असेल. घाटघरजवळ छोटे तलावही खोदलेले आहेत. त्याचाच अर्थ प्रवासी, लमाणांचे तांडे व त्यांच्या जनावरांसाठी पाणीपुरवठा करण्याचीही सोय असावी.
 
 नाणेघाट - 44 वर्षांपूर्वी    फोटो - बलवंत सांगळे
 
    नाणेघाट सध्या दुरवस्थेत असला तरी त्याची पद्धतशीर आखणी व रचना करण्यात आली असावी हे तेथील अवशेषांवरून स्पष्ट होते. स्थानिक आख्यायिकेप्रमाणे ते काम अभियांत्रिकी क्षेत्रात निपुण असलेल्या नाना व गुणा या दोन तज्ज्ञांकडे देण्यात आले होते. त्यांपैकी जो प्रथम घाट बांधेल त्याचे नाव घाटास द्यावे असे ठरले. दोघांनीही त्यांचे कौशल्य पणाला लावले, घाट बांधणीस सुरुवात झाली. कोकणाकडे तोंड असलेल्या सह्याद्रीच्या उभ्या कड्याला त्याच्या वैशिष्ट्यपूर्ण आकारामुळे 'नानाचा अंगठा' असे म्हणतात. घाटाच्या निर्मितीस त्या ठिकाणाहून सुरुवात झाली असावी. अंगठ्याच्या दक्षिण भागाकडील काम गुणाला तर उत्तरेकडील भागाचे काम नानाला देण्यात आले. नानाला दिलेला मार्ग गुणापेक्षा अवघड असला तरी त्याने तो वर्ष संपण्याआधी पूर्ण केला. साहजिकच, नानाचे नाव त्या घाटाला पडले. दोन घाट बाजूबाजूलाच बांधण्याचे सातवाहनांचे काही प्रयोजन असावे. त्या काळातील वाहतुक आणि लष्करी हालचाली यांसाठी एकमेकांस समांतर घाट असणे आवश्यक ठरले असावे. सातवाहनांचे शक क्षत्रपांबरोबर संघर्ष सतत सुरू असत. सातवाहनांनी घाटाच्या सुरक्षिततेसाठी उपाय केलेले असावेत हे निकटच्या किल्ल्यांवरून लक्षात येते. जुन्नरपासून सोळा किलोमीटरवर चावंडचा किल्ला, बारा किलोमीटरवर हडसरचा किल्ला व त्यापुढे बहिरव व जीवधन हे किल्ले आहेत. त्याचाच अर्थ त्या व्यापारी मार्गांना संरक्षण मजबूत तटबंदीच्या माध्यमातून देण्याची गरज भासली असावी.
      काही रांजणांवरील कोरीव लेख महत्त्वपूर्ण माहिती देतात. शिंगरू पठारावरील रांजण दोन तोंडांचा असून त्यावर प्राकृत भाषेत ‘हा रांजण कामवन येथील व्यापारी दामघोष याने वशिष्ठपुत्र सातकर्णी याच्या राज्यकालाच्या  तेराव्या वर्षांत कोरला’ असे म्हटले आहे.( सोपारयकस गोविन्ददासस धम्मदायपोढी ) तेथेच, थोड्या बाजूला तलावाच्या कडेला दगडात कोरलेले बाक आहे. तो तलाव सोपारा येथील व्यापारी गोविंददास याने खोदला अशी माहिती त्या बाकावर मिळते.हा गोविंददास सोपार्‍याचा म्हणजे सध्याच्या नालासोपार्‍याचा रहिवासी होता.गेल्या दोन हजार वर्षात कल्याण्,नाल्यासोपार्याकडून जुन्नरकडे जाणारे वाटसरु नाणेघाट चढून त्या टाकीचे पाणी पित असतील आणि त्या असंख्य लोकांचे दुवे त्या गोविंददासाला मिळाले असतील.
      सातवाहन काळ ते पेशवाईपर्यंत या घाटात राबता होता.  या घाटाची महत्त्वपूर्ण माहिती सुमारे दोन हजार वर्षांपूर्वी टॉलेमी या भू - इतिहास विशेषज्ञाने दिली आहे. तो 'नागुना' किंवा 'नानागुना' नदी असा घाटाचा स्पष्ट उल्लेख करतो. टॉलेमी भारतात आला नव्हता. त्याने इतर प्रवाशांनी दिलेल्या माहितीवरून नाणेघाटाचे वर्णन केले आहे. त्यामुळे तो डोंगरी भाग आहे की ती वाहती नदी आहे असा संभ्रम त्याच्यासमोर पडला व त्याने नाणेघाट ही व्यापारउदिमाची नदी आहे असा समज करून घेतला.तसेच नाणेघाटातून चालणार्‍या व्यापाराचा उल्लेख रशियन प्रवासी अफनासियस निकीतान यानेदेखील केला आहे.  सातवाहन काळातील नाही,पण सतराव्या शतकातील नाणेघाटातल रहदारीचा उल्लेख आपल्याला सापडतो. इ.स.१६७३ मध्ये ब्रिटीश प्रवासी व डॉक्टर फ्रायर नाणेघाट उतरुन कल्याणमार्गे मुंबईला गेला होता.जुन्नरवरुन निघाल्यावर दुपारी बारा वाजता तो नाणेघाटाच्या तोंडाशी पोहचला.तेव्हा कोकणातून मीठ घेउन येणारा तीनशे बैलांचा तांडा वर येत होता.खाली उतरायला रस्ता नसल्यामुळे तासभर फ्रायर वाट पहात तिथेच थांबला. नंतर संध्याकाळी नाणेघाट उतरुन फ्रायर पायथ्याशी पोहचला. ब्रिटीशकाळात या घाटास नानाघाट किंवा नानापास (nanapaas) असेही म्हणत असत. घाटास प्राचीन काळी महत्त्व असल्याने परिसरात अनेक सातवाहन काळातील लेण्या आहेत मात्र आता या लेण्याची पडझड झाली आहेमुंबई-पुणे व मुंबई-नाशिक हे महामार्ग इंग्रजांच्या काळात बांधल्याने नाणेघाटाचे महत्त्व कमी झाले. नाणेघाट हे प्राचीन व्यापारी घाटवाटेचे उत्तम उदाहरण आहे. 

हेही वाचा: महापालिकेकडून पैशाचा अपव्यय; चांगल्या रस्त्यावर लाखोंची उधळपट्टी

महारठी म्हणजेच महाराष्ट्र असा उल्लेख असलेला शब्द.

अंदाजे २२२७ वर्षांपूर्वी राणी नागणिकेने नाणेघाटची निर्मिती केली. या शिलालेखात आपल्याला महारठीनो हा शब्द वाचायला मिळतो ते वाक्य पुढील प्रमाणे..

महारठीनो अंगीय कुल वधनस सगरगिरीवलयाय पथविय पथम विरस वस य महतो मह

अर्थ - महारठी अंगीय कुलातील गिरीसमुद्रवलयांकित पृथ्वीवरील विरश्रेष्ठ असा पुरुष.

गेली अनेक वर्षे मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देण्यात यावा यासाठी महाराष्ट्र सरकार प्रयत्न करत असुन नाणेघाटातील हाच दोन हजार वर्षांपूर्वीचा पुरावा त्यासाठी ग्राह्य धरला जात आहे. यात महारठ्ठी भाषा बोलणारे लोक व ते ज्या प्रदेशात राहतात तो प्रदेश म्हणजेच महारठी प्रदेश म्हणजेच आजचा महाराष्ट्र होय. त्याच प्रमाणे सातवाहन कुलातील राजा हाल याने प्राकृत भाषेत गाथासप्तशती हा ग्रंथ लिहला असुन हा ग्रंथ महाराष्ट्राचा आद्य ग्रंथ मानला जातो व त्यावेळच्या महाराष्ट्राचे जनजीवन तसेच विविध रूपे आपल्याला या काव्य ग्रंथात आपणास वाचायला मिळतात.

 

















































No comments:

Post a Comment

मनसर

 प्रकार : गिरीदुर्ग जिल्हा : नागपुर उंची : १२०० फुट ...