Thursday, October 30, 2025

महाराष्ट्रीय राजघराणी

 
महाराष्ट्र संस्कृती  (१९७९) 
साहित्यिक पु. ग. सहस्रबुद्धे


२.
अस्मितेचा उदय
 



 महाराष्ट्राची पृथगात्मता केव्हापासून दिसू लागते याचा शोध गेल्या प्रकरणात आपण घेतला. तेराव्या शतकापासून मागे जाताजाता इ.पू. ३००/४०० या काळापर्यंत आपण प्रवास केला. त्यावरून तेव्हापासून या प्रदेशाची स्वतंत्र अशी महाराष्ट्री भाषा सिद्ध झालेली होती, आणि या भाषेमुळेच या प्रदेशाला व तेथील लोकांना पृथगात्मता प्राप्त झाली होती असे आपल्याला आढळून आले. या महाराष्ट्री प्राकृत भाषेपासूनच पुढे इ. सनाच्या चौथ्या पाचव्या शतकात महाराष्ट्रीअपभ्रंश भाषा निर्माण झाली व आणखी चारपाच शतकांनी या अपभ्रंशापासूनच मराठीचा जन्म झाला, असे दिसून आल्यामुळे महाराष्ट्राच्या पृथगात्मतेचा धागा त्या त्र्यंबकेश्वरापासून नेवाशापर्यंत अतूट चालत आला आहे, असे आपल्याला निःशंक म्हणता आले.

महाराष्ट्र - नामाभिधान
 आता यापुढील प्रश्न म्हणजे ज्या प्रदेशात या भाषांचा हा स्वतंत्र संसार थाटला गेला आणि विकसत राहिला त्या प्रदेशाच्या नामभिधानाचा होय. अगदी प्रारंभी महाराष्ट्राच्या सीमारेषा आपण पाहिल्या. गोवा ते दमण ही पश्चिम रेषा, तेथून तापीच्या काठाने भंडाऱ्यापर्यंत उत्तरसीमा व तेथून गोव्यापर्यंत तिरपी येणारी ती पूर्वदक्षिण सीमा अशा या भूमीच्या सीमा आहेत. या महाराष्ट्राच्या सीमा असे आज आपण निःशंकपणे म्हणतो. पण या भूमीला हे महाराष्ट्र असे अभिधान केव्हापासून प्राप्त झाले. ते आता पहावयाचे आहे.
तेराव्या शतकात मराठी भाषा परिपक्व दशेस आली व त्यामुळे या भूमीची अस्मिता तेथून पुढे वादातीत झाली असे मागल्या प्रकरणात आपण म्हटले आहे. याचवेळी महाराष्ट्र हे नामाभिधानही निश्चित झालेले होते, असे आपल्याला दिसून येते. ज्या ज्ञानेश्वरांच्या ग्रंथामुळे मराठी परिपक्क दशेस आली त्यांनी त्याच ग्रंथात 'आम्ही आपला ग्रंथ महाराष्ट्र मंडळात रचला' असे सांगून या भूमीचे अभिधानही निश्चितपणे सांगितलेले आहे. ज्ञानेश्वर म्हणतात -

ऐसे युगी वरी कळी । आणि महाराष्ट्र मंडळी
श्री गोदावरीच्या कुळी | दक्षिणिली
तेथ महेशान्वय संभृते । श्रीनिवृत्तनाथ
केले ज्ञानदेव गीते । देशीकार लेणे

यावरून स्वतंत्र भाषेप्रमाणेच स्वतंत्र अभिधानही तेराव्या शतकाच्या अखेरीला निश्चित झालेले होते यात शंका नाही.
 या आधी महानुभावपंथीयांनी महाराष्ट्र हे नाव आपल्या ग्रंथात वापरलेले आहे. या भूमीचा अभिमानही त्यांनी वाहिला आहे. पण एकतर त्यांचे ग्रंथ शंभरएक वर्षात त्यांनी गुप्त करून टाकले. त्यामुळे या भूमीच्या अस्मितेच्या पोषणास त्यांचा पुढील शतकात काहीच उपयोग झाला नाही. आणि ज्ञानेश्वरी या ग्रंथामुळे मराठी भाषेला जी प्रौढता आली, प्रगल्भता आली, परिपक्वदशा आली, अमृताते पैजा जिंकण्याचे तिला जे सामर्थ्य आले ते महानुभावांच्या ग्रंथांमुळे येणे, ते गुप्त झाले नसते तरी, शक्य नव्हते. त्यामुळे मराठीजन्य अस्मितेचा प्रारंभ ज्ञानेश्वरीपासूनच झाला असे म्हणावे लागते. इटली या देशाच्या सीमा कोठपर्यंत मानाव्या असा प्रश्न येताच, महाकवी डान्टे याची भाषा जेथपर्यंत बोलली जाते तेथपर्यंत, असे निःसंदेह उत्तर इटलीत दिले जाते. त्याचप्रमाणे महाराष्ट्राच्या सीमा कोठपर्यंत असा प्रश्न येताच, ज्ञानेश्वरांची भाषा जेथपर्यंत बोलली जाते तेथपर्यंत, असे उत्तर निःसंदेह देता येईल. ते महानुभावांच्या कोणत्याही ग्रंथावरून देता येणार नाही. म्हणून महाराष्ट्र या नावाची मोहोर या भूमीवर ज्ञानेश्वरांनीच केली असे म्हणण्यात फार मोठे औचित्य आहे.
 हे निश्चित झाल्यानंतर आता भाषेचा ज्याप्रमाणे आपण मागोवा घेत मागे मागे गेलो त्याचप्रमाणे 'महाराष्ट्र' या अभिधानाचा मागोवा घेत आपल्याला प्रवास करावयाचा आहे. आणि हे नाव प्रथम या भूमीला केव्हा प्राप्त झाले ते पहावयाचे आहे. त्या प्रवासात प्रथम आपल्याला महानुभावांची भेट होईल हे उघडच आहे.

महानुभाव साहित्यात
 महानुभावांचे महाराष्ट्रावर अगदी अनन्य असे प्रेम होते, भक्ती होती. कर्नाटक, तेलंगण या प्रांतांत न जाता 'महाराष्ट्री वसावे' असा चक्रधरस्वामींचा शिष्यांना नेहमी उपदेश असे. हा प्रदेश सात्त्विक वृत्तींना पोषक आहे, तेथली हवा मुमुक्षूंना हितकारक आहे आणि सर्व सद्गुणांचा या भूमीत परिपोष होतो, अशी त्यांची श्रद्धा होती. 'महंत राष्ट्र म्हणौनि महाराष्ट्र, महाराष्ट्र निर्दोष आन सगुण, धर्म सिद्धी जाये ते माहाराष्ट्र', अशी महानुभाव ग्रंथकारांची वचने प्रसिद्ध आहेत. (आचारपाठ, १ ले सूत्र ) ' महाराष्ट्री विद्या आणि पुरुष असे' हे वचन लीळाचरित्रात एकदोनदा आले आहे. (एकांक-लीळा क्र. ४. पूर्वार्ध-लीळा क्र. २५०) चक्रधरांच्या तोंडचे उद्गार वर दिलेच आहेत. त्यावरून महाराष्ट्र हा प्रदेशवाचक शब्द ज्ञानेश्वरांच्या आधी निश्चित रूढ झाला होता असे दिसते.
 त्या काळी त्या लेखकांच्या मनात महाराष्ट्राची व्याप्ती काय होती हे कोठे स्पष्ट झालेले नाही. पण चक्रधराविषयी लिहिताना उत्तरकालच्या लोकांनी ते अगदी स्पष्ट केले आहे. 'देश म्हणजे खंडमंडळ | जैसे फले ठाणा पासौनि दक्षिणसि मऱ्हाटी भाषा जेतुला ठायी वर्ते ते एक मंडळ | तयासी उत्तरे बालाघाटाचा शेवट असे ऐसे एक खंडमंडल | मग उभय गंगातीर ( गोदातीर ) तेही एक खंडमंडळ | आन तयापासोनि मेघंकर घाट ते एक खंडमंडळ | तयापासोनि अवघे वराड ते एक खंडमंडळ | परी अवघे मिळोनि महाराष्ट्र बोलिजे किंचित किंचित भाषेचा पालट भणौनि खंडमंडळे जाणावी.' हा उतारा तेराव्या शतकातील आचार - महाभाष्य या ग्रंथातील आहे. फलटण, बालाघाट, लोणार - मेहकर, गोदापरिसर व वऱ्हाड एवढा प्रदेश म्हणजे महाराष्ट्र, असा लेखकाचा अभिप्राय आहे. कृष्णमुनी तथा डिंभ या लेखकाने 'श्री ऋद्धिपूर महत्त्व' या ग्रंथात पुढीलप्रमाणे महाराष्ट्राच्या सीमा दिल्या आहेत. 'विंध्याद्री- पासून दक्षिणदिशेसि कृष्णानदीपासून उत्तरेशी । झाडी मंडळापासून पश्चिमेसी कोकणपर्यंत, महाराष्ट्र बोलिजे । चक्रधर क्रीडा केली जेथे जेथे ' यावरून महानुभावांच्या मनात महाराष्ट्र म्हणजे कोणता देश होता ते स्पष्ट होईल.

राजशेखर
 राजशेखर हा नाटककार व साहित्यशास्त्रज्ञ इ. सनाच्या दहाव्या शतकात होऊन गेला. तो बहुधा महाराष्ट्रीय असावा. आपल्या 'बालरामायण' या नाटकात त्याने अकालजलद या आपल्या पणजोबांचा महाराष्ट्रचूडामणिः । असा उल्लेख केला आहे. हा ब्राह्मण होता. पण याची स्त्री अवन्तीसुंदरी चव्हाण ही क्षत्रिय होती. 'कर्पूरमंजरी' हे त्याचे नाटक महाराष्ट्री प्राकृतात आहे. त्यात चाहुआण कुलमोलिमालिआ राअसेहरकइन्दगेहिणी ' असा तिचा त्याने गौरवपूर्वक उल्लेख केला आहे. बालरामायणात, लंकेहून सीतेसह राम परत जात होते त्या वेळी, सुग्रीव रामाला म्हणाला, ' भरताग्रज, अयमग्रे महाराष्ट्रविषयः ।' रामचंद्रा, हा समोर महाराष्ट्र देश आहे. या ठिकाणी रामाने सीतेला कुंतल व विदर्भ या महाराष्ट्रातील खंडमंडळाचे वर्णन करून सांगितले. कुंतल ( सातारा, कोल्हापूर हा भाग ) हा ' मदनाचे स्थान' आहे व विदर्भ म्हणजे 'सारस्वती जन्मभू: ' आहे असे राम म्हणतो. स्वयंवराला जमलेल्या राजांत कुंतल देशाचा राजा होता, त्याचा सीता 'महाराठ्ठ वरिठ्ठो' असा निर्देश करते. यावरून विदर्भ व कुंतल हे दोन विभाग त्या वेळी महाराष्ट्रात मोडत होते असे दिसते. ' चतुर्विशति प्रबंध ' या आपल्या ग्रंथात राजशेखर महाराष्ट्राचा अनेक वेळा उल्लेख करतो. ' इह भारतवर्षे दक्षिणखंडे महाराष्ट्र देशावतंसं श्रीमत् प्रतिष्ठानं नाम पत्तनं विद्यते ' (पृ. १३६) हा त्यांपैकी एक होय. यात पैठणचा उल्लेख येतो. विदर्भ, कृष्णाकाठ व पैठण या तीहींवरून आजच्या महाराष्ट्राच्याच सीमा त्या वेळी असाव्या असे दिसते.

लीलावई
 कोऊहल कवी इ. स. ८०० च्या सुमारास होऊन गेला. त्याने आपले 'लीलावई' हे खंडकाव्य 'महरठ्ठ-देसी भासा ' मध्ये लिहिले आहे. का? तर त्याच्या प्रियतमेने 'सर्वसाधारण स्त्रियांना समजेल अशा भाषेत तुम्ही काव्य लिहा ', असा आग्रह धरला म्हणून ( लीलावई ४१ व १३३० ) . 'लीलावती' या काव्यात शातवाहन राजा हाल व सिंहलद्वीपाची राजकन्या लीलावती यांच्या प्रणयाची व विवाहाची कथा आहे. त्यात प्रारंभीच कवीने हाल राजाच्या राज्याचे जे वर्णन केले आहे त्यातून त्याच्या मनातील महाराष्ट्र. अश्मक व हालाची राजधानी प्रतिष्ठान (पैठण) नगरी यांच्याविषयीचा उत्कट अभिमान प्रकट झालेला आहे. कवी म्हणतो, 'पृथ्वीला भूषणभूत असलेल्या या प्रदेशात धनधान्यसमृद्धीमुळे शेतकरी संतुष्ट असतात. मदिरा- पानाने सुखी होऊन येथले लोक गाणी गातात. त्या गीतसौंदर्याने उद्याने नेहमी भरून गेलेली असतात. या महाराष्ट्रात नित्य कृतयुग असते. ही भूमी म्हणजे धर्माचा आधार आहे. येथील सृष्टी म्हणजे ब्रह्मदेवाची शाळाच आहे. ही सृष्टी पाहूनच तो आपली सृष्टिरचना करतो. हा देश सुखसमूहांचे जन्मस्थान होय. सद्गुणांचे सुक्षेत्र होय. येथले कोवळे गवत खाऊन गोधन पुष्ट झालेले असते व त्याच्या हंबरण्यामुळे दिशा निनादून गेलेल्या असतात. येथे सर्वत्र जलविहार करण्याजोगी तळी आहेत. उत्तम वृक्षवेली असलेली उद्याने आहेत. सर्वत्र कमळांनी भरलेली सरोवरे आहेत. या भूमीत कलिकाल येतच नाही. येथे पाप कोणी पाहिलेले नाही. शत्रुचा पराक्रम येथे कोणाला दिसतच नाही. या देशाची राजधानी प्रतिष्ठान नगरी अत्यंत रम्य असून ती गोदावरीच्या काठी वसलेली आहे. या नदीत स्नान करून मरहट्टीया स्त्रिया आपली सर्व पापे धुऊन टाकतात. त्यांच्या वक्षांची हळद पाण्यात मिसळल्यामुळे गोदावरीचे पाणी पिवळसर झालेले असते. ' ( लीलावई - संपादक - डॉ. उपाध्ये पृ. ११-१५ ). स्वभाषा व स्वदेश यांच्या अभिमानाचे इतके स्पष्ट दर्शन या काव्यात होते की या काळी महाराष्ट्राची अस्मिता संशयातीत होती असे म्हणण्यास हरकत नाही.
 उद्योतनसुरी याने आपला 'कुवलयमाला' हा अपभ्रंश भाषेतील काव्यग्रंथ इ. स. ७७८ च्या सुमारास रचला. त्यात त्याने 'घटमुट, काळासावळा, सहनशील, अभिमानी व कलहशील आणि दिण्णले, गहिल्ले असे बोलणारा मरहट्टा' असे मराठ्यांचे वर्णन केले आहे.

चिनी प्रवासी
 विजापूर जिल्ह्यातील ऐहोळे येथे इ. स. ६३४ मध्ये कोरलेला जैन कवी रविकीर्ती याचा लेख आहे. त्यात 'दुसरा चालुक्यसम्राट सत्याश्रय पुलकेशी हा नव्याण्णव हजार गावे असलेल्या तीन महाराष्ट्रकांचा राजा झाला' असा उल्लेख आहे. 'अगमदधिपत्वं यो महाराष्ट्रकाणां, नवनवति सहस्रग्रामभाजां त्रयाणाम् ।' सातव्या शतकात ( इ. स. ६३९ ) हुएनत्संग हा चिनी प्रवासी भारतात आला होता. त्याने महाराष्ट्र, मराठे व मराठ्यांचा राजा सत्याश्रय पुलकेशी यांचे मोठ्या गौरवाने वर्णन केले आहे. तो म्हणतो, 'महाराष्ट्राची भूमी सुपीक असून ती धन्यधान्याने समृद्ध आहे. येथले लोक साधे, प्रामाणिक पण तापट आहेत. त्यांच्या जे उपयोगी पडतात त्यांशी ते कृतज्ञ असतात. पण त्यांना कोणी दुखविले तर ते सूड घेतल्याखेरीज राहात नाहीत. लढाईत पळपुट्यांचा ते पाठलाग करतात; पण शरण आलेल्यांना ते मारीत नाहीत. राजाजवळ हजारो शूर शिपायांचे सैन्य नित्य खडे असते. लढाईला निघताना ते मद्य पिऊन धुंद झालेले असतात. आणि अशा भालाइतातील एक शिपाई हजारांना भारी असतो. अशा सैन्यापुढे कोणताच शत्रु उभा राहू शकत नाही. त्यांचा राजा अशा सेनेच्या बळावर शेजारच्या शत्रूला मुळीच मोजीत नाही ( डॉ. रा. गो. भांडारकर. कलेक्टेड वर्क्स, ३ रा खंड, पृ. ७२ ).

प्रकृष्टं प्राकृतम्
 महाराष्ट्राश्रयां भाषां प्रकृष्टं प्राकृतं विदुः । हे सातव्या शतकात होऊन गेलेल्या कवी- दण्डीचे वचन प्रसिद्धच आहे. त्यावरून महाराष्ट्र हा देशवाचक शब्द होता. त्याची भाषा महाराष्ट्री होती व ती सर्वश्रेष्ठ होती या तिन्ही गोष्टींचा बोध होतो. ' भाग्ये रसविक्रयिणः पण्यस्त्रीकन्यका महाराष्ट्राः । ' हे वराहमिहिराने ( इ. स. ५०५) बृहत् संहितेत केलेले वर्णन आहे. या ठिकाणी महाराष्ट्राः हा शब्द 'महाराष्ट्र देशे ये जना निवसन्ति ।' महाराष्ट्रात राहणारे लोक, या अर्थी योजलेला आहे, असे बृहत्संहिंतेवरील आपल्या टीकेत भट्टोत्पलाने सांगितले आहे. सागर जिल्ह्यातील एरण या गावी इ. स. ३६५ मध्ये स्तंभावर कोरलेला एक शिलालेख आहे. श्रीधरवर्म्याचा सेनापती सत्यनाग हा आपल्याला महाराष्ट्री म्हणवितो, असे त्यावरून समजते. श्रीधरवर्मा हा महाक्षपत्र होता. सत्यनाग हा त्याचा सेनापती. त्यानेच हा स्तंभ उभारलेला आहे. त्यावरील लेख संस्कृतात असून त्यात 'राज्ञः आरक्षिकेन सेनापति सत्यनागेन महाराष्ट्रप्रमुखेन, महाराष्ट्रेन' असा त्याने स्वतःचा उल्लेख केला आहे.
 हा कोरीव लेख आहे आणि 'महाराष्ट्र ' देशाचा उल्लेख असलेला आद्य लेख आहे. त्यामुळे त्याचे महत्त्व विशेष आहे. हा चौथ्या शतकातला 'महाराष्ट्र' या प्रदेश नावाचा उल्लेख झाला. यापूर्वीच्या काळात या नावाचा उल्लेख शिलालेखात किंवा ग्रंथात कोठेच सापडत नाही. उल्लेख सापडतात ते 'महारठ्ठ', 'महारठी' असे सापडतात. त्यांचे महत्त्व कमी आहे असे नाही. प्राकृतातले ते उल्लेख असल्यामुळे त्यांना महत्त्व जास्तच आहे. पण आज रूढ असलेल्या महाराष्ट्र या नावाचा मागोवा घेत आपण चाललो होतो. त्यातला हा आद्य लेख म्हणून याचे महत्त्व विशेष एवढेच. येथून मागे 'महारठ्ठ' या नावाचा शोध घेत आपल्याला जावयाचे आहे. पण तत्पूर्वी पुराणातील 'महाराष्ट्र ' प्रदेशाचे उल्लेख पाहून मग तिकडे वळू. पुराणरचना साधारणपणे चौथ्या शतकाअखेरीपर्यंत पुरी झाली असे काही पंडितांचे मत आहे. पण त्यात मागून पुष्कळ भर घातली गेली, हे सर्वमान्य आहे. त्यामुळे त्यातील उल्लेख हा विश्वसनीय पुरावा मानता येत नाही; तथापि त्यातील निर्देश पाहणे हे अवश्य आहे.
 मार्कंडेय पुराणात - ' महाराष्ट्रामाहिषकाः कलिंगाश्रैव सर्वशः' असा महाराष्ट्राचा उल्लेख आहे ( अध्याय ५७, श्लोक ४६ .). याच ठिकाणी दक्षिणापथात कोणते देश येतात ते सांगताना इतर देशांबरोबर दण्डक, अश्मक, नैसिक, कुंतल, वैदर्भ यांचाही उल्लेख आहे. ५८ व्या अध्यायातही पुन्हा महाराष्ट्र, कर्नाटक असा निर्देश आलेला आहे. पुराण ग्रंथांचा प्रसिद्ध अभ्यासक पार्गिटर याने मार्कंडेय पुराणाच्या प्रस्तावनेत इ. स. ४ थे शतक असा त्याचा काळ ठरविलेला आहे. त्याच्या मते पुराणातले महाराष्ट्रजन हेच अर्वाचीन मराठे होत. मार्कंडेयाप्रमाणेच वायू व ब्रह्म या पुराणातही महाराष्ट्र हे देशनाम सापडते.
 वात्स्यायनाच्या कामसूत्रात 'महाराष्ट्रकाणाम् व ' महाराष्ट्रिक्य' असे उल्लेख आहेत. शं. रा. शेंडे यांच्या मते कामसूत्राचा काळ शालिवाहन शकाचे पहिले शतक हा होय. भरताच्या नाट्यशास्त्रातही 'द्रमिडांध्र - महाराष्ट्रा:' असा महाराष्ट्राचा उल्लेख आहे. सुशील कुमार दे यांच्या मते भरताचा काळ इ. सनाचे पहिले शतक किंवा इ. पूर्व दुसरे शतक होय. पण या दोन्ही ग्रंथांच्या काळाबद्दल फारच मतभेद आहेत.

महाराष्ट्र - महारठ्ठ
 'महारठ्ठ' हे महाराष्ट्र याचेच प्राकृतरूप आहे असे प्राकृत व्याकरणकारांचे निश्चित मत आहे. हा ' महारठ्ठ' शब्द सुमारे सहाव्या शतकात लिहिल्या गेलेल्या पाली भाषेतील ' महावंस' या ग्रंथात येतो. मोगली पुत्ततिस्स याने इ. पू. तिसऱ्या शतकात बौद्धांची परिषद भरविली होती. त्या वेळी त्याने आपले बुद्ध धर्मोपदेशक महिसमंडल, वनवासी, अपरांतक, महारठ्ठ इ. प्रांतांत पाठविले होते असे महावंशात सांगितले आहे. असाच उल्लेख बुद्धघोषाच्या समंतपासादिकेच्या प्रस्तावनेत आहे. 'योनकधम्म रख्खितथेरं अपरान्तकं, महाधम्मरख्खितथेरं महारठ्ठं पेसेसी ।' असे तो म्हणतो. ( विनयपिटक - खंड ३ रा, सं. ओल्डेनबर्ग. या ग्रंथालाच बुद्धघोषाची ही प्रस्तावना जोडलेली आहे. प्र. ३१४ पाहा ) बुद्धघोष हा इ. सनाच्या ५ व्या शतकात झाला असे एक मत आहे. हा ख्रिस्ती शकाच्या पूर्वार्धात होऊन गेला, हे अनेक पुराव्यांनिशी सिद्ध झाले आहे असे ज्ञानकोशकार म्हणतात. महावंशाच्या दीड वर्षाच्या आधीच्या 'दीपवंस' या ग्रंथात महावंशाप्रमाणेच महारठ्ठला धर्मोपदेशक पाठविल्याचा उल्लेख आहे. 'महाधम्मरख्खितथेरो महारठ्ठं पसादयि । '
 महारठ्ठाचे हे उल्लेख इ. सनाच्या चौथ्या, पाचव्या, सहाव्या शतकातले असले तरी मोगली पुत्ततिस्स याने येथे धर्मोपदेशक पाठविले ही घटना इ. पू. तिसऱ्या शतकातली आहे. यावरून या प्रदेशाला त्या काळापासून 'महारठ्ठ' हे नाव रूढ झाले होते, असे मिद्ध होते, असे डॉ. पां. वा. काणे म्हणतात ते सयुक्तिक वाटते. ( एन्शंट जॉग्रफी अँड सिव्हिलिझेशन ऑफ महाराष्ट्र जे. बी. बी. आर. ए. एस. व्हॉ. २४. इ. स. १९१४–१६, पृ. ६२२ ).
 'महारठ्ठ' हा देशवाचक शब्द असला तरी महारठ, महारठिनी हे शब्द तेथील स्त्रीपुरुषांचे वाचक होत हे उघड आहे. सातवाहनांच्या काळचे इ. पू. २०० पासून पुढचे नाणेघाट, भाजे, कारले, बेडसे, कान्हेरी येथले शिलालेख आता उपलब्ध झाले आहेत. त्यांत "वेदिसिरिस महारठिनो, महारठिस कोतकीपुतस विण्हुदतस, महाभोयबालिकाय महादेविय, महारठिनिय, महारठिस, गोतिपुत्रस, अग्निमिणकस, महाभोजिय बालिकाय महारठिणिय, " असे शब्द आले आहेत. हे सर्व महारठ शब्दाचे उपयोग महाराष्ट्राचे देश व लोक या नात्याने अस्तित्व निःसंशय सिद्ध करतात. ( डॉ. केतकर, प्राचीन महाराष्ट्र, पृ. २४ )

दक्षिणापथ
 आपल्या मायभूमीचे आजचे नाव ' महाराष्ट्र' असे आहे. त्याचा मागोवा घेताना ते इ.सनाच्या चौथ्या शतकापर्यंत रूढ असलेले आपल्याला आढळले. त्यापूर्वी या प्रदेशाचे नाव 'महारठ्ठ' असे होते. आणि महावंस, दीपवंश इ. ग्रंथांतील घटनांच्या आधारे पाहता ते इ. पू. तिसऱ्या शतकात सर्वविश्रुत होते असे दिसते. त्याच्या पूर्वीच्या काळात मात्र ही दोन्ही अभिधाने सापडत नाहीत. पण त्या पूर्वीच्या काळात 'महाराष्ट्र' भूमीला 'दक्षिणापथ ' असे नामाभिधान होते, असे काही विद्वानांचे मत आहे. त्याचा आता विचार करू. दक्षिणापथ हे नाव फार प्राचीन आहे. बौधायन- सूत्र, महाभारत, रामायण, पतंजलीचे महाभाष्य, इ. ग्रंथांत दक्षिणापथ हा शब्द अनेक वेळा आलेला आढळतो; पण अनेक ठिकाणच्या उल्लेखांवरून असे दिसते की 'दक्षिणापथा'त कोणत्या प्रदेशांचा समावेश होतो यासंबंधी भिन्न मते आहेत. नर्मदेपासून रामेश्वरापर्यंतच्या सर्व दक्षिण प्रदेशाला 'दक्षिणापथ ' म्हटलेले काही ठिकाणी आढळते. पूर्वचालुक्यांचा पहिला राजराज विष्णुवर्धन याने दिलेल्या दानात असे म्हटले आहे की विष्णुवर्धनाने सेतू व नर्मदा यांमधील सप्तलक्षांचा दक्षिणापथ जिंकला. समुद्रगुप्ताचा अलाहाबाद येथील चौथ्या शतकातील शिलालेख पाहता असे दिसते की पिष्टपूर (मद्रास इलाखा ), ऐरंडपल्ल ( तेलंगण ), कांची, वेंगी व देवराष्ट्र इ. भाग म्हणजे कन्याकुमारीपासून नर्मदेपर्यंतचा सर्व प्रदेश दक्षिणापथात मोडत होता.
 पण काही ठिकाणी कमी व्यापक अर्थानेही दक्षिणापथ हा शब्द वापरलेला आढळतो. पांड्यांना जिंकून नंतर सहदेव हा दक्षिणापथाला गेला, असे महाभारतात म्हटले आहे. त्यावरून पांड्यांचा देश दक्षिणापथात समाविष्ट होत नव्हता असे दिसते. पेरिप्लसचा (ग्रीक) कर्ता दक्षिणापथाचा उल्लेख दक्षिणावेडस असा करतो. आणि भडोच पासून दामिरिका ( द्रविड देश ) पर्यंतच त्याची व्याप्ती सांगतो. दक्षिणावेडस हा, डॉ. भांडारकरांच्या मते, दक्षिणापथ, दक्षिणावध, दक्षिणावध - याचा अपभ्रंश असणे शक्य आहे. अशा काही प्रमाणांवरून दक्षिणापथाचा एक अर्थ तरी 'महाराष्ट्र' असा आहे, असे डॉ. रा. गो. भांडारकर ( कलेक्टेड वर्क्स, व्हॉ. ३ रा, पृ. ६ ), म. म काणे ( एन्शंट जॉग्रफी अँड सिव्हिलिझेशन ऑफ महाराष्ट्र, पूर्वोक्त ) व डॉ. केतकर (प्राचीन महाराष्ट्र, पृ. २२) या थोर पंडितांनी आपले मत दिले आहे. पाकिस्तान झाल्यापासून हिंदुस्थान या संज्ञेचा अर्थ बदलला आहे. मराठेशाहीत केवळ उत्तर हिंदुस्थानालाच हिंदुस्थान म्हणत असत. पोलंड, रुमानिया यांच्या सीमा आपल्या डोळ्यांदेखतच दोन वेळा बदलल्या. हे ध्यानात घेता 'दक्षिणापथ' या संज्ञेची विवक्षा पुरातनकाळी बदलली असणे शक्य आहे असे मानण्यास प्रत्यवाय येणार नाही असे वाटते.

घटक प्रदेश
 आज जिला आपण महाराष्ट्र म्हणतो तेवढ्या व्यापक भूमीला मागल्या काळात एक असे प्रदेशवाचक अभिधान होते की नाही याचा येथवर आपण शोध घेतला. त्यावरून इ. सनाच्या चौथ्या शतकापर्यंत महाराष्ट्र हे नाव सापडते; त्याआधी ४ । ५ शतके इ. स. पूर्वी तिसऱ्या शतकापर्यंत महाराठ्ठ हे नाव आढळते आणि त्याच्यापूर्वी दक्षिणापथ हे नाव सापडते, असे दिसले. हा अखिल महाराष्ट्राच्या नावाविषयी विचार झाला. पण महाराष्ट्राचे जे विदर्भ, मराठवाडा, कोकण इ. विभाग आहेत त्यांचे स्वतंत्र उल्लेख याच्या पूर्वीच्या काळच्या ग्रंथांतही विपुल सापडतात. त्यावरून असे दिसते की या सर्व भूप्रदेशाला एक अभिधान प्राप्त होण्याच्या पूर्वीपासूनच त्याच्या भिन्न भिन्न घटक विभागांत महाराष्ट्र संस्कृतीची जोपासना होत होती. विदर्भ, अश्मक, कुंतल, अपरान्त ही या भूमीच्या विभागांची नावे प्राचीन संस्कृत वाङ्मयात वारंवार आढळतात. त्याचप्रमाणे पांडुराष्ट्र, गोपराष्ट्र, मल्लराष्ट्र अशीही येथल्या भूविभागांची नावे असलेली दिसतात. या नावांनी त्या काळी कोणत्या खंडमंडळांचा निर्देश होत होता ते पाहिल्यावर यांचा महाराष्ट्र भूमीत कसा समावेश होत होता, ते ध्यानात येईल.
विदर्भ म्हणजे आजचा वऱ्हाड प्रांत होय, हे जवळ जवळ सर्वमान्य आहे. त्याच्या विस्ताराविषयी काही मतभेद आहेत. वऱ्हाडापेक्षा विदर्भ मोठा होता असे म. म. मिराशी व कुलगुरू चिं. वि. वैद्य यांचे मत आहे. पण हा किरकोळ मतभेद आहे. विदर्भाचा प्रथम उल्लेख बृहदारण्यकोपनिषदात सापडतो ( अ. २, ब्रा. ६-३ ). आर्य प्रथम दक्षिणेत आले ते प्रथम विदर्भ आणि अपरान्त (कोकण) या प्रांतांत आले. उत्तर व दक्षिण यांमध्ये विंध्य हा दुर्लंघ्य पर्वत उभा होता. त्याच्या पश्चिमेकडून व पूर्वेकडून वाट काढणे सोपे होते. त्यांपैकी पश्चिमेकडून भृगू ऋषी अपरान्तात म्हणजे उत्तर कोकणात उतरले व पूर्वेकडून अगस्ती ऋषी विदर्भात उतरले. अगस्तीबरोबर भोज या क्षत्रीयवंशाची एक शाखाही विदर्भात आली. त्या वंशात विदर्भ नावाचा एक राजा होता. त्याने विदर्भा नगरीची स्थापना केली. कुंडिनपुर ते हेच. त्या राजाच्या नावावरूनच विदर्भ हे नाव पडले. ऐतरेय ब्राह्मणातही विदर्भाचा उल्लेख आहे ( ७. ३४. ९ ). महाभारत व रामायण यात महाराष्ट्र हे अभिधान नाही. पण विदर्भाचे निर्देश मात्र अनेक वेळा येतात. श्रीकृष्णाची पट्टराणी रुक्मिणी ही विदर्भ राजकन्या होती. याच भोजवंशात दमयन्तीचा जन्म झाला होता. अजराजाची राणी इन्दुमती ही भोजकुलातलीच होती. अगस्त्याची स्त्री लोपामुद्रा ही पण विदर्भकन्याच होती. विदर्भ हे धर्मनिष्ठ व श्रेष्ठ राष्ट्र होते असा महाभारतात त्याचा गौरव केलेला आहे. ' - राष्ट्रे धर्मोत्तरे श्रेष्ठे विदर्भेष्वभवद् द्विजः । ' ( भीष्म, २७२.३ ) पुढील काळात विदर्भाचा हा गौरव वाढतच गेला, असे दिसते. यानंतरचा प्रांत म्हणजे अश्मक हा होय. हा गोदावरीच्या भोवतालचा परिसर होय. प्रतिष्ठान-पैठण ही याची राजधानी. भीष्मपर्वात दक्षिणेच्या देशांची यादी दिली आहे तीत अश्मकराष्ट्र आहे. याच्या राजाचा अभिमन्यूने वध केला, असे द्रोणपर्वात सांगितले आहे. अशोकाच्या शिलालेखात पेतनिक म्हणून उल्लेख येतो तो पैठणचा होय असे विद्वानांचे मत आहे. म. म. काणे यांच्या मते प्राचीन काळी खानदेश, नाशिक, नगर या जिल्ह्यांचा अंतर्भाव अश्मकात होत होता. यादवकाळात यालाच सेऊण देश म्हणू लागले. यादव सरदार सेऊणचंद्र याने हे नाव दिले. सिन्नर ही त्याची राजधानी होती.
 कुंतल हा चिं. वि. वैद्य यांच्या मते कृष्णेच्या उगमाजवळचा देश. महाबळेश्वर, कऱ्हाड, मिरज, कोल्हापूर, चिकोडी, बेळगाव, मुधोळ यांचा यात समावेश होत असे. विदर्भात भोजांनी वसती केली तशी कुंतलात यादवांनी केली. प्रा. स्टेन को नौ यांच्या मते कुंतल व विदर्भ मिळून महाराष्ट्र होतो. महाभारताप्रमाणेच पुराणातही कुंतलाचा निर्देश आहे. वात्स्यायनाच्या कामसूत्रात कुंतलः सातकर्णिः | असा उल्लेख सापडतो.
 अपरान्त म्हणजे कोकण हा प्रांत प्राचीन काळापासून विदर्भाइतकाच प्रसिद्ध आहे. महाभारत, अशोकाचे लेख, त्याच्याही पूर्वीची गौतमधर्मसूत्र, बौधायनधर्मसूत्र ही धर्मसूत्रे (इ.पू. ५००) यात अपरान्ताचे उल्लेख येतात. शूर्पारक, सूपारक, अर्वाचीन सोपारा ही याची राजधानी होती. ही जशी परशुरामभूमी म्हणून प्रसिद्ध त्याचप्रमाणे नागभूमी म्हणून प्रसिद्ध आहे. पाताळ, रसातळ, महीतळ हे सर्व कोकणच्या विभागांचेच उल्लेख आहेत, असे राजवाडे म्हणतात. चेमुलक (चौल ), कलियण ( कल्याण ) ही कोकणातील बंदरे प्राचीन काळापासून प्रसिद्ध आहेत. येथून पाश्चात्य देशांशी मोठा व्यापार तेव्हा चालत असे. ग्रीक भूगोलज्ञ टॉलेमी याने अपरान्ताचा याचसाठी निर्देश केला आहे ( इ. पू. १५० ). पुढे पुराणात, नाशिकच्या शिलालेखात अपरान्त सूपारक यांचे उल्लेख वारंवार येतात.
 गोपराष्ट्र म्हणजे नाशिकचा परिसर होय. मल्लराष्ट्र हे त्याच्या दक्षिणेस होते. पांडुराष्ट्र हे प्रसिद्ध पांड्यराष्ट्र होय. याचाही अंतर्भाव त्या वेळी महाराष्ट्रात होत असावा असे कृ. पां. कुळकर्णी म्हणतात.

मरहट्ट- कानडी
 शं. वा. जोशी यांनी आपल्या 'मऱ्हाटी संस्कृती - काही समस्या' या पुस्तकात महाराष्ट्र हे देशनाव, मराठे लोक, त्यांची मऱ्हाटी भाषा याविषयी काही अभिनव मते मांडली आहेत. त्यांच्या मते महाराष्ट्र या देशाचे मूळ नाव मरहट्ट असे होते. ते नाव कानडी आहे. मर हा कानडी शब्द असून त्याचा अर्थ झाड असा आहे. हट्ट, हट्टी हे पत्ती या संस्कृत शब्दाचे कानडी रूप होय. हे दोन शब्द मिळून मरहट्ट शब्द झाला. वऱ्हाडात हटगार - धनगर या लोकांची वस्ती आहे. आणि मूळ महाराष्ट्र म्हणजे वऱ्हाडच होय. झाडीमंडळ असे वऱ्हाडचे एक दुसरे नाव पूर्वी रूढ होते. तेव्हा झाडीत राहाणारे हट्टी ते मरहट्टे लोक होत आणि त्यांच्यावरून त्यांच्या भाषेला नाव पडले हे स्पष्ट आहे. हे विवेचन करताना जोशी यांनी असा विचार वारंवार मांडला आहे की इ. सनाच्या बाराव्या शतकापर्यंत महाराष्ट्र या भूप्रदेशावर कानडी भाषेचे व कर्नाटकाचे सामाजिक व राजकीय वर्चस्व होते. त्या सुमारास मराठी भाषा कानडी- पासून वेगळी होऊ लागली. ज्ञानेश्वरीवर कानडीची दाट छाया आहे. यावरून हे अनुमान निश्चित होते. खानदेश हा कृष्णदेश म्हणजे कानडी देशच होय. वऱ्हाड ( वऱ्हाट ) याचेच ' व ' चा 'म' होण्याच्या कानडी प्रवृत्तीमुळे मऱ्हाट असे रूप झाले. राष्ट्रकूटाचे पूर्वज राष्ट्रिक - रिस्टिक हे होत. राष्ट्रिक याचा अर्थ देशाचा मूळ रहिवासी. हा राष्ट्रिक शब्द नाडव या कानडी शब्दाचे भाषांतर होय. त्र्यंबकेश्वरला हाटकेश्वर असेही एक नाव आहे. त्यातील हाटक म्हणजे हट्टी. त्यांचा ईश्वर तो हाटकेश्वर. भावार्थ असा की इ. सनाच्या बाराव्या शतकापर्यंत महाराष्ट्र हा कन्नड देशच होता.
 व्युत्पत्तीच्या आधाराने जोशी यांनी एक उत्कृष्ट भ्रमजाल निर्माण केले आहे यात शंका नाही. याबद्दल त्याचे अभिनंदन करावे तेवढे थोडेच आहे. त्यांच्या या विचार- सरणीचा आता परामर्श घेऊ.
 जोशी म्हणतात, जुन्या काही पंडितांनी महारथी, महारठी, राष्ट्रिक - महाराष्ट्रिक वगैरे क्लृप्त्या लढवून महाराष्ट्राची व्युत्पत्ती सांगण्याचा प्रयत्न केला आहे. पण त्यांतील एकही उपपती समंजस नाही. याचे कारण काय? तर त्यांतील एकाची व्युत्पत्ती दुसऱ्यास संमत नाही. डॉ. भांडारकर, डॉ. काणे, राजवाडे यांची मने परस्परविरोधी आहेत ! वरील पंडितांची मते परस्परविरोधी आहेत, एकाचे मत दुसऱ्यास संमत नाही. म्हणून त्यांतील एकही मत समंजस नाही, हे अजब तर्कशास्त्र आहे. त्याअन्वये कोणतेही मत असमंजस व त्याज्य ठरविता येईल. कारण ते कोणाला तरी अमान्य असतेच. जोशी यांची त्यांच्या या पुस्तकातील सर्वच मते या न्यायाने असमंजस ठरतील.
 वररुची हा व्याकरणकार इ. सनाच्या प्रारंभी होऊन गेला. त्याने महाराष्ट्री हे भाषेचे नाव दिलेले आहे. मरहट्टे लोकांची हीच महाराष्ट्री प्राकृत भाषा होय हे जोशी यांना मान्य आहे. पण भाषेला ते नाव कसे पडले, हा वाद आहे. कारण महाराष्ट्र हा शब्द वररुचीच्या पूर्वी सापडत नाही. शिवाय महाराष्ट्र हा जनवाचक शब्द नाही, देशवाचक आहे. प्राचीन काळी देशांना नावे पडत ती जनांवरून, लोकांवरून पडत. तेव्हा वररुचीच्या पूर्वी महाराष्ट्र देशाला लोकांवरून पडलेले दुसरे नाव असलेच पाहिजे. ते कोणते असावे ? तर मऱ्हाट, आणि ते मरहट्टे या लोकांवरून पडले. आणि हा शब्द कानडी आहे.

आधी महाराष्ट्र
 वररुचीच्या पूर्वी महाराष्ट्र हा शब्द कोणत्याही ग्रंथात आढळत नाही, म्हणून या देशाचे ते नाव होते, हे मत स्वीकारता येत नाही असे म्हणून जोशी 'मरहट्ट' हे नाव सुचवितात. तेव्हा हा शब्द वररुचीच्या पूर्वीच्या कोणत्या तरी ग्रंथात आहे असे दाखविण्याची जबाबदारी त्यांनी घ्यावयास हवी होती, पण तसे त्यांनी दाखविलेले नाही. त्यांच्याच मते मरहट्ट शब्द प्रथम लीलावई या इ. स. ८०० च्या सुमारास झालेल्या काव्यात सापडतो. त्याच्या पूर्वीच्या लेखांत, ग्रंथांत 'महाराष्ट्र' हा शब्द निश्चित आढळतो हे त्यांनाही मान्य आहे. तरी 'मरहट्ट' शब्दच मूळचा व मागून त्याचे महाराष्ट्र हे संस्कृतीकरण झाले असा त्यांचा आग्रह आहे. या शब्दातील दोन्ही पदे मर व हट्ट ही कानडी आहेत, आणि हा शब्द इ. सनापूर्वी वररुचीपूर्वी रूढ असला पाहिजे, असे जोशी यांचे मत आहे. पण त्या काळी कानडी भाषाच अस्तित्वात नव्हती. कानडीतला पहिला शिलालेखच इ. स. ४५० च्या सुमाराचा आहे. त्या आधी फारतर शेदोनशे वर्षे ती भाषा बोलण्यात असणे शक्य आहे. इ. सनापूर्वी ती असणे तर शक्य नाही. तरी त्या काळी हे कानडी नाव वऱ्हाड प्रांताला व पर्यायाने महाराष्ट्राला पडले होते, असे जोशी म्हणतात.
 जनांवरून, लोकांवरूनच प्रदेशाला नाव पडते हा जोशी यांचा आग्रह अनैतिहासिक आहे. दक्षिणापथ, सिंध, पंजाब, अवंती ही नावे लोकांवरून पडलेली नाहीत. मल्लराष्ट्र, गोपराष्ट्र, पांडुराष्ट्र, यांचे एकीकरण होऊन जे मोठे राष्ट्र झाले ते महाराष्ट्र असे कोणी म्हणतात. पण 'मोठे' हा शब्द देशाची पहाणी, मोजमाप झाल्यावाचून लावणे शक्य नाही. आणि असे मोजमाप त्याकाळी असंभव होते, असे जोशी म्हणतात. मोठेपणाची कल्पना मोजमाप करूनच येते, अन्य मार्गाने नाही असा हा युक्तिवाद आहे. महानदी हे नदीला पडलेले नाव भारतातल्या सर्व नद्यांची मोजमापे घेऊन नंतर दिले गेले, असे जोशी यांचे मत असावे !

पत्ती-हट्टी
 हाटकेश्वर यात हाटक हा सोने या अर्थाचा संस्कृत शब्द आहे. हट् = प्रकाशणे या धातूपासून तो साधला आहे. पण जोशी यांनी त्याचा हट्टी शब्दाशी संबंध जोडला आहे; व हड्डी-हाटक-जनांचा ईश्वर तो हाटकेश्वर असा समास सोडविला आहे. वऱ्हाडचे म्हणजेच मूळ महाराष्ट्राचे रहिवासी तेच हे हट्टीजन. यांच्यावरूनच मरहट्टे हे नाव पडले. म. म. मिराशी यांनी जोशी यांच्या एतद्विषयक सर्व मतांचे खंडन केले आहे (नवभारत, डिसें. १९५३ ). ते म्हणतात, वऱ्हाडातील धनगर समाजाचे हट किंवा हट्टी हे नाव कोणत्याही प्राचीन कोरीव लेखात आढळत नाही. नाशिक, कारले भाजे, कान्हेरी इ. ठिकाणच्या कोरीव लेखांत अनेक जातींची नावे आली आहेत. पण हट किंवा हट्टी हे नाव नाही. त्यांच्यावरून देशाला नाव पडण्याइतके त्यांना महत्त्व असते तर त्यांचा नामनिर्देश खचित आढळला असता. हट्टी हा मूळ पट्टी ( पत्ती ) शब्द होय. तो यजुर्वेदातील रुद्राध्यायात आहे, असे सांगून जोशी यांनी त्यावर मोठीच इमारत रचली आहे. पत्ती म्हणजे मूळचे आर्येतर लोक म्हणजेच द्रविडी - हट्टी-लोक होत असे ते म्हणतात. मिराशी म्हणतात की रुद्राध्यायात, 'पत्तीनां पतये नमः ।' असे म्हटले आहे. पण रथपती, अश्वपती, सेनापती यांच्याबरोबरच पत्ती शब्द येतो. तेव्हा 'पादचारी योद्धा' असा सायणाचार्यांनी त्याचा केलेला अर्थच संदर्भाशी जास्त जुळता आहे. मधलाच एक शब्द तेवढा जनवाचक मानणे सयुक्तिक नाही. डेक्कन कॉलेज पुणे येथील डॉ. सांकलिया यांनीही महाराष्ट्र शब्दाची व्युत्पत्ती ही हट्टी किंवा पट्टी या शब्दापासून लावण्याचा जोशी यांचा प्रयत्न अयोग्य आहे, असेच मत दिले आहे (महाराष्ट्र संस्कृतीचा प्रारंभकाल - मौज, दिवाळी अंक १९५४). हेमाद्रीने झाडीमंडळ जिंकले, असा उल्लेख यादवांच्या शिलालेखात आहे. त्याचा अर्थ वऱ्हाड असा करून जोशी यांनी मरहट्ट हेच मूळ महाराष्ट्राचे नाव असे मत मांडले आहे. पण मिराशी म्हणतात, तेथे झाडीमंडळ याचा अर्थ वऱ्हाड असा करणे युक्त नाही. कारण वऱ्हाड हा हेमाद्रीच्या आधीच यादवांनी जिंकला होता असे अनेक शिलालेखांवरून दिसते.

व्युत्पत्तीची जादूगिरी
 ज्ञानेश्वरीवर कानडीची दाट छाया आहे हे जोशी यांचे विधान असेच मनोरंजक आहे. ज्ञानेश्वरीत १२००० शब्द आहेत. त्यांतील सुमारे ४० शब्द कानडी आहेत. ही दाट छाया होय ! आता व्युत्पत्तीच्या साधनाने आणखी अनेक शब्द कानडीपासून आले असे दाखविता येईल; पण जोशी यांच्या इतर व्युत्पत्तींप्रमाणेच याही मनोरंजक ठरतील. पुलकेशी हा संस्कृत शब्द पुल म्हणजे मोठा व केशी म्हणजे सिंह. पण जोशी कुपुली या कानडी शब्दापासून तो साधू पहातात. वसिष्टी पुत्र पुलुमायी किंवा पुलुमावी हा सातवाहन राजा. त्याच्या नावातील पुलुमायी शब्द हाही पुली ( वाघ ) यापासूनच झाला असे जोशी म्हणतात. पण पुलोमारी -( इन्द्र ) याचा तो अपभ्रंश असणे अगदी शक्य आहे. तेव्हा व्युत्पत्तीची जादूगिरी करून एखाद्या राष्ट्राच्या वा समाजाच्या नावासंबंधी, कर्तृत्वासंबंधी, मूलस्थानासंबंधी काही सिद्धान्त काढणे फार धोक्याचे आहे हे आपण ध्यानात ठेविले पाहिजे.
 मरहट्ट म्हणजे झाडीमंडळ, तेच वऱ्हाड आणि तोच मूळ महाराष्ट्र, खानदेश हा मूळ कण्ण देश म्हणजेच कानड देश; राष्ट्रिक हे नाडव या कानडी शब्दाचे भाषांतर; ज्ञानेश्वरीवर कानडीची दाट छाया आहे इ. विधाने मांडून इ. सनाच्या बाराव्या शतकापर्यंत महाराष्ट्र हा भावार्थाने कन्नड देशच होता असे मत जोशी यांनी आग्रहाने मांडले आहे. या दोन प्रदेशांतील देवतांचे साम्य दाखवून हाच निष्कर्ष त्यांनी काढला आहे; आणि शेवटी कन्नड व मराठे हे मूळचे जुळे बंधू आहेत असे उदार विधान केले आहे. डॉ. सालेटोर या पंडितानेही जवळजवळ असेच मत मांडले आहे. गोदावरीच्या परिसरात राष्ट्रकूटांच्या काळी कानडी संस्कृती व भाषा यांचे वर्चस्व होते व मराठी- कानडी अशी एक मिश्र बोली तेव्हा तेथे बोलली जात असे, असे ' यादव आणि त्यांचा काळ ' या आपल्या ग्रंथात ते म्हणतात.
 याउलट, श्रवणबेळगोळ या म्हैसूरजवळील गावी गोमटेश्वराचा जो पुतळा आहे त्याच्या खाली ' श्री चावुंडराये करवियले ' असा मराठी शिलालेख आहे, त्यावरून म्हैसूरपर्यंतचा भाग दहाव्या शतकापर्यंत महाराष्ट्रात होता असे मत एका संशोधकाने मांडले आहे.

तीन महाराष्ट्रके
 पण एवढ्यावरच हे भागले नाही. शंकर रामचंद्र शेंडे यांनी ऐहोळे येथील बदामीच्या चालुक्यांच्या काळचा, इ. स ६३४ सालचा सत्याश्रय पुलकेशीच्या प्रशस्तीपर, असा रविकीर्तीचा जो शिलालेख आहे त्यातील अगमदधिपत्वम् । इ. ज्या श्लोकाचा वर निर्देश केला आहे त्याच्या आधारे त्या काळी म्हैसूर, गुजराथ, माळवा, राजस्थान या प्रदेशांचाही महाराष्ट्रात समावेश होत असे असे प्रतिपादन केले आहे ( भांडारकर ओ. रि. इन्स्टिट्यूट, सिल्व्हर ज्युबिली व्हॉल्यूम, 'दि एक्स्टेंट ऑफ महाराष्ट्र ', पृ. ४९४ ). रविकीर्तीच्या या प्रशस्तिकाव्यात, श्लोक १८ ते २२ यांत सत्याश्रय पुलकेशी याने गंग, वनवासी, लाट, मालव, गुर्जरदेश इ. प्रदेश जिंकले असे सांगून त्यानंतर पुढील तीन श्लोकांत त्याची स्तुती गाताना ९९००० ग्रामे असलेल्या तीन महाराष्ट्रकांचा तो अधिपती झाला असे म्हटले आहे. यावरून वर जिंकलेले म्हैसूर, गुजराथ, माळवा इ. प्रदेश म्हणजे पुढल्याच श्लोकातील तीन महाराष्ट्र, असा शेंडे यांनी अर्थ केला आहे. असा अर्थ होणे शक्य आहे हे खरे. पण केवळ एवढया निर्देशावरून म्हैसूर, गुजराथ, माळवा हे प्रदेश म्हणजे महाराष्ट्राचाच विभाग होता असे म्हणणे युक्त वाटत नाही. ज्या प्रदेशात महाराष्ट्री प्राकृत भाषा किंवा महाराष्ट्री अपभ्रंश भाषा या प्रचलित होत्या, जेथे या भाषेत ग्रंथरचना होत असे, शिलालेख लिहिले जात होते आणि हे सर्व विपुल प्रमाणात होत होते त्यालाच महाराष्ट्र म्हणता येईल. एरवी नाही. अशी प्रमाणे वरील देशात मुळीच मिळत नाहीत. एकतर वनवासी, गंग, गुजराथ या जिंकलेल्या प्रदेशांचा उल्लेख 'तीन महाराष्ट्रके' यात आहे हे निश्चित नाही. आणि दुसरे म्हणजे एका निर्देशावरून एवढा अर्थ लावणे साहसाचेच होय. शं. वा. जोशी यांनी ज्या विचारपद्धतीचा आपल्या पुस्तकात अवलंब केला आहे त्या पद्धतीने शेंडे यांचे प्रतिपादनही सयुक्तिक मानावे लागेल हे खरे. पण ती पद्धती सर्वथैव त्याज्य होय. ( इंडियन अँटिक्वेरी, खंड ८ वा आणि एपिग्राफिया इंडिका, खंड ६ वा, यात पुलकेशी - प्रशस्तीचे रविकीर्तीचे सर्व काव्य दिले आहे.)

माळव्यापर्यंत
 दुसऱ्या एका लेखात शेंडे यांनी, इ. सनाच्या बाराव्या शतकापर्यंत नर्मदेच्या उत्तरेस उज्जयनी माळवा प्रांतात, महाराष्ट्री भाषेतला शके १९३२ सालचा एक लेख सापडला आहे, तेथील हिंदी भाषेशी महाराष्ट्री व महाराष्ट्री अपभ्रंश यांतील रूपांचे व म्हणींचे साम्य आहे, इ. प्रमाणे देऊन महाराष्ट्राच्या सीमा त्या काळापर्यंत माळव्याच्या मध्यरेषेपर्यंत पसरल्या होत्या, असे म्हटले आहे. (विक्रमस्मृती, ग्वाल्हेर, पृ. ४६६ ) हीही प्रमाणे वरच्याप्रमाणेच अपुरी आहेत. केवळ महाराष्ट्रत्रयांचा उल्लेख यापेक्षा ती खूपच जास्त आहेत. पण तेथपर्यंत महाराष्ट्राचा विस्तार होता असे विधान करण्याच्या दृष्टीने ती अगदी अल्प आहेत.
 डॉ. वि. भि. कोलते यांनी याच ग्रंथात 'अपभ्रंशापासून मराठी निघाली' असा सिद्धान्त मांडला आहे व शेवटी अपभ्रंशाचे स्थान असलेली अवंती व तिच्या भोवतालचा परिसर हे मराठीचे माहेर मानायला हरकत नाही, असे म्हटले आहे. पण शेवटी - ऐतिहासिक दृष्टीने या विधानाची काटेकोर सत्यता अजून सिद्ध व्हावयाची आहे, असे नमूद करून ठेविले आहे.
 शं. बा. जोशी किंवा शं. रा. शेंडे यांचे विवेचन वाचताना एक विचार मनात येतो. वेदकाळापासूनच आर्य, द्रविड, नाग या जमाती एकत्र राहात होत्या. त्यांच्यांत वर्णसंकरही विपुल चालू होता. पुढे हेच लोक भिन्नकाळी दक्षिणेत उतरून गुजराथ, माळवा, महाराष्ट्र, कर्नाटक येथे स्थायिक झाले. द्रविड देशातील भाषा संस्कृताहून भिन्न असल्या तरी इ. पूर्व तिसऱ्या शतकापासून त्यांच्यावर संस्कृत व प्राकृत यांचे वर्चस्व बसू लागले होते. अशा स्थितीत एका भाषेतील शब्द, रूपे, म्हणी इ. अन्य भाषेत सापडतात एवढ्यावरून फार मोठी अनुमाने काढणे हे युक्त नाही.

मराठे लोक कोण ?
 पहिल्या प्रकरणात मराठी भाषेची पूर्वपीठिका आपण पाहिली. नंतर या प्रकरणात 'महाराष्ट्र' या अभिधानाच्या इतिहासाचा व त्याच्या विस्ताराचा शोध घेतला. आता महाराष्ट्रीय म्हणजेच मराठे हे लोक कोण आहेत, ते कोणत्या वंशाचे होते, ते येथे केव्हा आले व या भूमीला महाराष्ट्र हे अभिधान मिळाले ते कोणावरून, हे पाहावयाचे आहे. ते पाहून झाले की महाराष्ट्राच्या पृथगात्मतेचा निश्चय पूर्ण झाला असे होईल.
 या बाबतीत आजपर्यंत निरनिराळ्या पंडितांनी जी मते मांडली आहेत ती येथे एकत्र मांडण्यापलीकडे काही करता येण्याजोगे नाही. कारण प्रत्यक्ष शास्त्रीय व ऐतिहासिक अशी प्रमाणे, असे आधार, या बाबतीत फार थोडे आहेत - जवळजवळ नाहीतच. बहुतेकांनी शब्दांच्या व्युत्पत्तीचा आधार घेतला आहे. तो आधार किती फसवा असतो ते पंडितांनी एकमेकांवर ज्या टीका केल्या आहेत त्यांवरून सहज दिसून येईल. व्युत्पत्ती- खेरीज इतर आधार म्हणजे प्राचीन ग्रंथांत दक्षिणेतल्या जमातींच्या नावाचे जे उल्लेख येतात व त्यांची जी वर्णने सापडतात, ते होत. पण त्यांतील पुष्कळशी वर्णने काल्पनिक असतात. आपापल्या वंशाचे श्रेष्ठत्व सिद्ध करण्यासाठी चंद्रसूर्यास्तापर्यंत आपली परंपरा नेऊन भिडवावयाची अशी पूर्वी लोकांना फार हौस असे. त्याचप्रमाणे इतरांना हीन ठरविण्यासाठी त्यांना संकरज ठरविण्याचा उद्योगही चालू असे. मनूने व इतर धर्मशास्त्रकारांनी संकरज जातींच्या याद्याच्या याद्या दिल्या आहेत. आता या धर्मशास्त्रज्ञांनी संकराचे हे गुणदोष कसे ठरविले, त्यांना यात कितपत माहिती होती, त्यांना यातले काय कळत होते, हे मोठेच प्रश्न आहेत शिवाय यांतल्या प्रत्येक ग्रंथात पुढील लोकांनी हवी तशी भर घातली आहे. त्यामुळे त्यातून मागल्या काळच्या लोकांविषयी काही विश्वसनीय माहिती मिळेल ही आशा करण्यात अर्थ नाही. आणि माझ्या मते त्याला महत्त्वही नाही. महाराष्ट्रातले आजचे लोक जुन्या काळी प्रथम कोठून आले, ते कोणत्या वंशाचे होते, आर्य होते की अनार्य होते, नाग होते की द्रविड होते, ब्राह्मण होते की महार होते याला ऐतिहासिक जिज्ञासा, कुतूहल यापलीकडे काही महत्त्व नाही. त्यांनी पराक्रम कोणते केले, कर्तृत्व कसे प्रगट केले, मन, बुद्धी, प्रतिभा यांचे कोणते सामर्थ्य त्यांच्या ठायी दिसत होते याला सांस्कृतिक दृष्ट्या खरे महत्त्व आहे. ऐतिहासिक घटनांच्या आधारे ते जितक्या निश्चयाने ठरविता येईल तितके ठरविणे हे आपले उद्दिष्ट आहे. महाराष्ट्राची पृथगात्मता ठरविण्यासाठी भाषेच्या संशोधनाला व नामाभिधानाच्या इतिहासाला जसे महत्त्व आहे तसे येथल्या लोकांच्या मूळस्थानाच्या व त्यांच्या मूलवंशाच्या शोधाला नाही. आहे ते त्यांच्या कर्तृत्वाला आहे. म्हणजेच त्यांच्या संस्कृतीला आहे. ते वैभव येथे आहे असे दिसले तर या लोकांचे मूलस्थान कोणते होते व मूलवंश कोणता होता याला महत्त्व नाही. आणि ते वैभव नसले तर या लोकांच्या इतिहासाचा विचार करण्याला अर्थच नाही. म्हणून वर सांगितल्याप्रमाणे या बाबतीत विद्वनांच्या मतांची नोंद घेण्यापलीकडे फारसे काही करण्याची आवश्यकता नाही आणि काही करता येण्यासारखे नाही. कारण विश्वसनीय असा पुरावा या बाबतीत मुळीच उपलब्ध नाही. म्हणून पंडितांच्या भिन्न मतांची फक्त माहिती पुढे देतो.

राजवाडे मत
 इतिहासाचार्य वि. का. राजवाडे यांनी 'राधामाधवविलासचंपू' या ग्रंथाच्या प्रस्तावनेत आपले मत मांडले आहे. इ. पू. ५००-६०० च्या सुमारास मगधातील महाराजांचे भक्त जे महाराजिक म्हणजेच महाराष्ट्रिक लोक ते तेथील बौद्ध व जैन धर्मीय राजांच्या जुलमाला कंटाळून दक्षिणेत वसाहत करण्यास आले. त्यांच्याबरोबरच कुरुपांचालांतून राष्ट्रिक नावाचे व उत्तरकुरू आणि उत्तरमद्र येथून वैराष्ट्रिक हे लोक आले. त्यांतील महाराष्ट्रिक है लोकसंख्येने खूपच जास्त असल्यामुळे सर्वांनाच पुढे महाराष्ट्रिक म्हणू लागले व त्यांच्यावरून या भूमीला महाराष्ट्र हे नाव पडले. हे लोक उत्तरेतून आले तेव्हा अनुलोम विवाह चालू होते. क्षत्रिय लोक शूद्रभार्या करीत. या शूद्रभार्यापासून झालेल्या संततीचा महाराष्ट्रिक लोकांत बराच भरणा होता. त्यामुळे हे लोक क्षत्रिय असले तरी कमतर क्षत्रिय होते. ते दक्षिणेत आले तेव्हा येथे नाग लोकांच्या आधीच वसाहती होत्या. या नागांशी त्या महाराष्ट्रिकांचा पुढील हजार वर्षात मिलाफ होऊन येथला आजचा मराठा समाज तयार झाला. त्यामुळे त्याच्या अंगी कर्तृत्व फारसे दिसून आले नाही. पाटिलकी, देशमुखी, सरदेशमुखी मिळवावी व टिकवावी यापलीकडे यांच्या ठायी धमक नव्हती. सातवाहन, राष्ट्रकूट, चालुक्य, यादव यांनी महाराष्ट्रात राज्ये, साम्राज्ये स्थापिली. पण ते सर्व राजवाडे यांच्या मते आर्य, अयोध्या, चेदी इ. प्रांतांतून आलेले म्हणजे परकी होत. त्यांचे राज्य म्हणजे महाराष्ट्रात परक्यांचे राज्य होय. त्या परक्यांच्या दास्यात महाराष्ट्रिक लोक इ.पू १ ल्या शतकापासून सतराव्या शतकापर्यंत म्हणजे सुमारे दीड हजार वर्षे रखडत होते. भोसल्यांचे राज्य झाले ते महाराष्ट्रात पहिले स्वकीयांचे राज्य होय.
 राजवाडे यांनी आपल्या या मताला कसलाच आधार दिलेला नाही. चालुक्य, राष्ट्रकूट, यादव यांना परकी का म्हणावयाचे ते त्यांनी सांगितलेले नाही आणि दुसरे असे की 'महाराष्ट्राचा वसाहत काल' या आपल्या प्रबंधात त्यांनी याच्या उलट लिहून ठेविले आहे. महाराष्ट्रातील पाटील, देशमुख हे सर्व अस्सल क्षत्रिय होत, असे ते म्हणतात. त्याचप्रमाणे रट्ट, महरट्ट, राष्ट्रिक, महाराष्ट्रिक हे जातीचे वा देशाचे नाव नसून प्रांताधिकाऱ्यांचे नाव आहे, राष्ट्र हा एक देशाचा विभाग, त्यावरील मुख्य तो राष्ट्रकुट, मोठ्या विभागावरील मुख्य तो महाराष्ट्रकूट असेही त्यांनी सांगितले आहे. ते पुढे म्हणतात की उत्तरेत लोकसंख्या अतोनात झाली तेव्हा हे लोक दक्षिणेत वसाहती करण्यास आले. हे उच्चवर्णीय क्षत्रिय होते. मानव्य, हैह्य, भोज, यादव, नल, मौर्य, चालुक्य इ. शेकडो गोत्रांचे म्हणजेच ९६ कुळीचे मराठे होत. मराठ्यांचा इतिहास म्हणजे या ९६ कुळींच्या कर्तृत्वाचा इतिहास होय.
 महिकावतीच्या बखरीच्या प्रस्तावनेत येथे कातवडी, कोळी, वारली, ठाकर है केव्हापासून राहात होते ते सांगून राजवाडे म्हणतात, महाराष्ट्र जितका महाराष्ट्रिकांनी बनविला तितकाच बहुतेक मांगेले, वारली, कोळी, कातवडी, लाडी, रांगडी इत्यादी पुंजांनी बनविला आहे.
 महाराष्ट्रातल्या लोकांपैकी कोण कोटून आले, ते कोणत्या वंशाचे होते, कोणाचे रक्त शुद्ध, कोणाचे मिश्र यासंबंधीची ही मते परस्पर-विसंगत आणि त्याचबरोबर प्रमाणहीन आहेत असे दिसून येईल. त्यामुळे त्यांचा विचार करण्याचे कारण नाही.

आर्य द्रविड
 कुलगुरु चिंतामणराव वैद्य यांच्या मते पाणिनीच्या नंतरच्या काळी म्हणजे इ. स. पू. ६०० च्या सुमारास आर्य लोक दक्षिणेत आले व गोपराष्ट्र, मल्लराष्ट्र, पांडुराष्ट्र अशा वसाहती करून राहिले. अशोकाच्या शिलालेखात रास्टिक लोकांचा उल्लेख येतो ते रास्टिक म्हणजे हेच लोक होत. आंध्रभृत्यांचे वेळी ते एका सत्तेखाली आले तेव्हा भोजांचे जसे पूर्वी महाभोज झाले तसेच राष्ट्रिकांचे महाराष्ट्रिक झाले व त्यांच्यावरूनच पुढे महाराष्ट्र हे नाव पडले. वैद्यांच्या मते आर्याचे नागांशी उत्तरेतच मिश्रण झाले होते; आणि आर्य दक्षिणेत आले त्यांच्याबरोबर नागलोकही आले. हे नाग द्रविडवंशीय होत. म्हणजे महाराष्ट्रीय लोक आर्यद्रविड वंशोद्भव आहेत. या मिश्रणा- मुळेच त्या काळात महाराष्ट्रात महाराष्ट्री ही प्राकृत भाषा निर्माण झाली. ( भारत इतिहास सं. मं. वर्ष १३ वे, अंक १ ला . ) .
 अशोकाचे शिलालेख आणि महाभारतातील गोपराष्ट्र, मल्लराष्ट्र इ. नावे यांचा या उपपत्तीला थोडा आधार आहे, त्यावर बसविलेली ही अनुमाने आहेत. त्यामुळे ही संभाव्य घटना आहे, एवढेच म्हणता येईल.

महारांचे राष्ट्र
 या देशात अत्यंत प्राचीन काळी महारांची वस्ती होती; व त्यांच्यावरूनच महारांचे राष्ट्र ते महाराष्ट्र असे नाव पडले, असे एक मत कोशकार मोल्सवर्थ यांनी गेल्या शतकात मांडले आहे. जॉन विल्सन यांनीही याच मताला पाठिंबा दिला होता. डॉ. केतकर यांनी 'प्राचीन महाराष्ट्र ' या आपल्या ग्रंथात हेच मत पुन्हा मांडले आहे. (पृ. २५-२७ ) विल्सन यांनी 'गाव तेथे महारवाडा' ही म्हण आधार म्हणून दिली आहे व तो आधार केतकरांनी ग्राह्य मानला आहे. केतकरांच्या मते अत्यंत प्राचीन काळी कोळी, भोई, महार व रठ्ठ यांची वस्ती महाराष्ट्रात होती व त्यामुळेच स्थलनामे व भाषानामे निश्चित झाली आहेत. ही उपपत्ती अशीच कल्पनेवर उभारलेली आहे. 'गाव तेथे महारवाडा' ही म्हण मराठीतली व म्हणूनच इ. स. हजार- नंतरची आहे. प्राचीन काळची घटना सिद्ध करण्यास तिचा आधार घेणे सयुक्तिक नाही. दुसरे असे की महार हा शब्द प्राचीन काळी एखाद्या जमातीचे नाव म्हणून रूढ असल्याचा कोणताही पुरावा उपलब्ध नाही. ऐतरेय ब्राह्मणात विश्वामित्राने स्वतःच्या पुत्रांना, त्यांनी अवज्ञा केली म्हणून, शाप दिला व तेच पुढे आंध्र, मूतिब, पुलिंद, पुंड्र, शबर झाले असा उल्लेख आहे. याखेरीज शक, यवन, बर्बर, शबर, म्लेंच्छ, आभीर, हूण, कुशान इ. अनेक आर्येतर व रानटी जमातींचा उल्लेख पुराणात येतो. पण महार हा शब्द आर्य व अनार्य कोणालाच लावलेला नाही. मनूने कैवर्त, चांडाल, किरात, दरद, खश इत्यादी जातींचा उल्लेख केला आहे. पण महार हे नाव कोठेही नाही. मग त्या काळी या नावाची जमात होती व तिच्यावरून या भूमीला नाव मिळाले असे डॉ. केतकर कशावरून म्हणतात ? डॉ. केतकर म्हणतात, त्या काळी येथील लोक आपणास महार म्हणवीत नसतील कशावरून ?' या उपपत्तीची चर्चा करण्याची गरज आहे असे वाटत नाही.
 डॉ. भांडारकरांनी रट्ट या शब्दाचेच संस्कृत रूप राष्ट्रिक होय, असे सांगून भोज जसे पुढे आपणास महाभोज म्हणवू लागले तसेच राष्ट्रिक आपणास महाराष्ट्रिक म्हणवू लागले, असे मत मांडले आहे. या भूमीत रस्टिक लोक होते असा निर्देश अशोकाच्या शिलालेखात आहे. त्यावरूनच रट्ट, त्यावरून महारट्ट व त्याचे संस्कृतीकरण महाराष्ट्र, अशी ही उपपत्ती आहे. म. म. पां. वा. काणे यांच्या मते महाराष्ट्र हे नाव वंशावरून किंवा जातीवरून पडलेले नसून देशाच्या विस्तारावरून पडलेले असावे. सातवाहन साम्राज्यात महाराष्ट्रातले अनेक घटक विभाग एकत्र झाले व त्या मोठ्या प्रदेशाला महाराष्ट्र असे नाव पडले असे त्यांचे मत आहे.

मिश्रवंश
 महाराष्ट्रातले लोक कोणत्या वंशाचे होते, ते मूळ कोठून आले आणि महाराष्ट्र हे अभिधान कशावरून पडले याविषयीची भिन्न मते आपण पाहिली. त्या मतांत काही विद्वानांची मते अगदीच काल्पनिक आहेत. इतर पंडितांच्या अनुमानांना काही थोडा आधार आहे, पण निश्चित निर्णय देण्याइतका तो पुरेसा नाही. महाराष्ट्री वा अपभ्रंश या भाषा येथे होत्या की नाही हे ठरविण्यास त्या भाषांतील शिलालेख, ग्रंथ, त्या काळच्या पंडितांनी त्यासंबंधी काव्यव्याकरणादी ग्रंथांत केलेले उल्लेख असा प्रत्यक्ष पुरावा मिळतो. त्याचप्रमाणे महाराष्ट्रीपासून अपभ्रंश व त्या अपभ्रंशापासून मराठी असे सिद्धान्त मांडण्यास स्वरव्यंजनप्रक्रिया, विभक्तिरूपांची घडण अशांसारखी निश्चित वस्तुनिष्ठ प्रमाणे उपलब्ध आहेत. पण येथल्या लोकांचा मूळचा वंश, वर्ण वा जाती कोणती हे ठरविण्यास निश्चित असा कसलाही आधार नाही. पंडितांनी दिलेली मते म्हणजे केवळ अनुमाने आहेत आणि तीही व्यक्तिनिष्ठ काल्पनिक अनुमाने! म्हणून ती स्वीकारणे युक्त नाही. पण या बाबतीत आणखी एक महत्त्वाचा विचार ध्यानात ठेवला पाहिजे. महाराष्ट्रीयांचा मूळ वंश वा जाती कोणती हे ठरविण्याचा अट्टाहास करण्याचे कारण, राजवाड्यांसारख्या काही पंडितांच्या मनात तरी निदान असे आहे की त्यांच्या मते संस्कृती ही वंशजातिवर्ण यांवर असते. आणि महाराष्ट्राची संस्कृती श्रेष्ठ आहे हे ठरविण्यास हे लोक श्रेष्ठवंशीय वा वर्णीय आहेत हे ठरविणे अवश्य आहे, असे त्यांना वाटते. हा भ्रम आपण आपल्या मनातून प्रथम काढून टाकला पाहिजे. या विषयाचे सविस्तर विवेचन पुढे समाजरचनाप्रकरणी येईलच. पण विपषयपूर्तीसाठी त्याचा सारार्थ सांगतो. पहिली गोष्ट अशी की आर्य हा शब्द वंशवाचक नाही, हे आता निश्चित सिद्ध झाले आहे. दुसरे असे की इ. सनाच्या दहाव्या शतकापर्यंत भारतात आणि महाराष्ट्रातही ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य व शूद्र यांच्यांत अनुलोम व प्रतिलोम विवाह विपुल होत असत. अनुलोम विवाहाला तर धर्मशास्त्राचीच मान्यता होती. त्यामुळे अमका वर्ण, अमकी जात येथे शुद्ध रक्ताची राहिली आहे, असा वृथाभिमान धरून, तिच्यामुळे संस्कृतीचा उत्कर्ष झाला किंवा दुसऱ्या संकरज जातीमुळे अपकर्ष झाला या म्हणण्याला काही अर्थ नाही. द्रविड, नाग, शक, हूण यांच्याशी आर्य म्हणविणाऱ्या लोकांचा उत्तरेत व दक्षिणेतही संकर होत होता याला विपुल ऐतिहासिक प्रमाणे उपलब्ध झालेली आहेत. शक, यवन, कुशाण, हूण, आभीर यांनी शतकानुशतक येथे धुमाकूळ घातला होता व दीर्घकाळ राज्येही चालविली होती. आणि रणकंदनेही केली होती. अशा स्थितीत वंशशुद्धी कितपत टिकली असेल हे सहज ध्यानात येईल. तेव्हा वर्ण व कर्तृत्व यांचा अविभाज्य संबंध आहे असे ज्यांचे मत आहे त्यांनीसुद्धा हे सत्य ध्यानात घेऊन राजवाड्यांसारखी विधाने न करणे हेच श्लाघ्य होय. या बाबतीत डॉ. इरावतीबाई कर्वे यांनी पुष्कळ संशोधन केले आहे. महाराष्ट्रातल्या अनेक जातिउपजातींची रक्ते तपासली आहेत. आणि त्या सर्व माहितीच्या आधारे 'मराठी लोकांची संस्कृती' या आपल्या ग्रंथात, वंशावर संस्कृतीचा उत्कर्षापकर्ष मुळीच अवलंबून नाही, असा निर्णय दिला आहे. 'संस्कृतीची परंपरा ही शरीर- परंपरेपेक्षा अगदी निराळी आहे, हे ध्यानात ठेविले तर सामाजिक प्रश्न सोडविण्यास लागणारी बुद्धीची शुद्धता तरी निर्माण होईल' असे त्यांनी म्हटले आहे (पृ. ७४ ). महाराष्ट्र - संस्कृतीच्या अभ्यासात मूळ वंशाच्या विचाराला महत्त्व नाही, असे मी जे वर म्हटले आहे ते याच अर्थाने. पण हे मत ज्यांना मान्य नाही त्यांनीही, निश्चित प्रमाणांच्या अभावी, कोणतीही ठाम विधाने करण्याचा मोह टाळणे हेच श्रेयस्कर ठरेल.
 महाराष्ट्र हे नाव कसे पडले याविषयी अशीच अनिश्चितता आहे. त्याही बाबतीत ढोबळ विचार असा दिसतो की राष्ट्रिक, रट्ट, रठ्ठ हे लोक गोपराष्ट्र, मल्लराष्ट्र, पंडुराष्ट्र, विदर्भ, अपरान्त, कुंतल अशा वसाहती करून येथे दीर्घकाळ रहात होते. ते एका साम्राज्यात आल्यावर या देशाला 'महाराष्ट्र' असे नाव पडले. त्यातल्या त्यात संभवनीय उपपत्ती ही वाटते, इतकाच अर्थ.
 काळासंबंधी विचार करता थोडे जास्त निश्चित बोलता येणे शक्य आहे असे वाटते. कारण तेथे भाषेचा निकट संबंध आहे. महाराष्ट्री ही भाषा इ. पू. ३००/४०० च्या सुमारास उदय पावली. आणि भाषेला प्रदेशावरून नाव पडले असण्याची जास्त शक्यता असते; त्या अर्थी त्या काळच्या सुमारास किंवा आगेमागे महाराष्ट्र हे नाव रूढ झाले असावे असे अनुमान करणे शक्य आहे. शूरसेन प्रांतातली ती शौरसेनी, मगधातली ती मागधी अशी नावे त्या त्या प्रदेशावरून प्राकृत भाषांना मिळाली हे सर्वमान्य आहे. त्याच पद्धतीने महाराष्ट्राची ती महाराष्ट्री हे मत स्वीकार्य वाटते आणि यामुळेच महाराष्ट्र हे नाव याच स्वरूपात, किंवा महारठ्ठ, महरट्ट या स्वरूपात तरी निदान, इ. पू. ४००/५०० च्या सुमारास पडले असणे संभवनीय आहे.

प्रादेशिक अस्मिता
 इ. पू. ३०० पासून महाराष्ट्राचा सांस्कृतिक इतिहास या ग्रंथात सांगावयाचा आहे. त्यासाठी त्या काळापासून महाराष्ट्राला स्वतंत्र अस्तित्व होते, पृथगात्मता होती हे निश्चित करणे प्रथम अवश्य होते. महाराष्ट्री भाषा व महाराष्ट्र हे नामाभिधान यांचा इतिहास पाहून ते प्रथम आपण निश्चित केले. आता पृथगात्मतेचे याहीपेक्षा एक महत्त्वाचे लक्षण पाहून हा विषय पुरा करू.
 भाषा, भूप्रदेश व लोक यांना काही भिन्नता, पृथगात्मता प्राप्त झाली असली तरी राष्ट्राच्या पृथगात्मतेचे खरे लक्षण म्हटले म्हणजे या पृथगात्मतेची लोकांच्या मनात जागृत असलेली जाणीव हे होय. प्रादेशिक अस्मिता, अहंता याचा हाच अर्थ आहे. अहंता ही लोकांच्या मनातच असू शकते. आम्ही इतरांपासून निराळे आहोत, म्हणजे श्रेष्ठ आहोत ही भावना म्हणजेच अस्मिता. हीच मानवाच्या सर्व कर्तृत्वाची जननी आहे. तेव्हा इ. पू. ३०० पासून इ. स. १३०० या कालखंडात महाराष्ट्रातील लोकांना, महरठ्ठांना आपला देश, आपला समाज व आपली भाषा यांचा अभिमान कितपत होता याचा विचार आता केला पाहिजे. संस्कृतीला प्रारंभ होण्यापूर्वी प्रत्येक देशाच्या गिरिकंदरात रानटी जमाती राहातच असत. तशा महाराष्ट्रातही होत्या. कातवडी, ठाकर, कोळी, गाेंड, भिल्ल, वारली या येथल्या आदिवासी जमाती होत, असे अभ्यासक आज सांगत आहेत. या जमाती परस्परांपासून भिन्न होत्या. त्यांच्या भाषाही भिन्न असण्याचा संभव आहे. पण आम्ही इतरांहून श्रेष्ठ आहो, आमचे कर्तृत्व असामान्य आहे अशी प्रबळ अहंता, असा प्रखर अभिमान त्यांच्या ठायी निर्माण झालेला नव्हता. म्हणूनच त्यांची कसलीही प्रगती होऊ शकली नाही.
 ग्रीकांचा उदय झाला त्या काळी त्यांच्या शेजारच्या प्रदेशात बल्गर, रुमिनी, सर्ब इ. रानटी जमाती राहात होत्या. ग्रीकही प्रारंभी त्यांच्याप्रमाणे रानटी अवस्थेतच होते. पण आपण रक्ताने श्रेष्ठ आहो, श्रेष्ठवंशीय आहो, अशी एक भावना, काही कारणाने, त्यांच्या ठायी निर्माण झाली. तिचे वर्णन करून प्रसिद्ध इतिहासपंडित एच. ए. एल. फिशर म्हणतो की या अस्मितेच्या जाणिवेमुळेच ग्रीकांच्या ठायी कर्तृत्वाचा उदय झाला (हिस्टरी ऑफ युरोप, पृ. १५) हाच प्रकार सर्वत्र होत असतो आणि म्हणूनच ही श्रेष्ठतेची जाणीव, हा अभिमान, हेच पृथगात्मतेचे खरे लक्षण होय, असे वर म्हटले आहे. हे लक्षण महाराष्ट्रीयांच्या ठायी कितपत होते, त्यांना स्वदेश, स्वभाषा व स्वसमाज यांचा अभिमान कितपत होता ते आता पाहावयाचे आहे. त्याचबरोबर इतरांना म्हणजे महाराष्ट्रीयतरांना यांच्या भिन्नतेची वैशिष्ट्याची भिन्न संस्कृतीची जाणीव होती की नाही, कितपत होती, हेही शोधावयाचे आहे.
 मराठीच्या प्रारंभकाळीच मराठीत वाङ्मय लिहून ज्यांनी या भाषेला नामरूप प्रात करून दिले त्या महानुभावांना महाराष्ट्राचा विशेष अभिमान होता. ' महाराष्ट्र म्हणजे महंत राष्ट्र' हे आचारस्थळकर्ते शिववास यांचे उद्गार वर एके ठिकाणी दिलेच आहेत. महाभाष्यकर्ते विश्वनाथवास यांचेही उद्गार असेच आहेत. 'थोरा पासोनी महाथोर, तयाते महाराष्ट्र म्हणिजे. तर राष्ट्रशब्दे आणिक देश बोलिले असत की. ना ते भूमीने थोर होती, परी गुणवृद्धीने नव्हेती.' दुसऱ्या एका उत्तरकालीन महानुभाव ग्रंथात महाराष्ट्राचा असाच गौरव केलेला आढळतो. ' साठी लक्ष देश महाराष्ट्र | तेथीचे राये शिहाणे सुभटू। वेदशास्त्रचातुर्याची पेठू भरेली तिये देशी । ऐसे हे महाराष्ट्र राये सुंदरू | वरी महाराष्ट्र भाषा चतुरू तेही बसविले गंगातीरु । क्षेत्र त्र्यंबक वेऱ्ही.
 यातील महाराष्ट्र देश व महाराष्ट्र भाषा यांचा अभिमान स्पष्ट आहे. ज्ञानेश्वरांच्या काळापासून मराठी भाषेचा, महाराष्ट्रभूमीचा व येथील भागवतधर्मी लोकांचा अभिमान निःसंह रीतीने प्रगट होऊ लागला. पण आपल्याला शोध घ्यावयाचा आहे तो त्याच्या मागल्या ह्जार दीडहजार वर्षांच्या काळातला. म्हणून मांगल्याप्रमाणेच महानुभावांपासून प्रारंभ केला आहे. तेथून सातवाहन काळापर्यंत आपण जाणार आहो.

वीरपुरुषांचा देश
 दहाव्या शतकातील नलचंपू या काव्यात कवीने महाराष्ट्राची 'वीरपुरुषांचा देश' म्हणून प्रशंसा केली आहे.

वीरपुरुषं तदेतद् वरदातटनामकं महाराष्ट्रम् ।
दक्षिणसरस्वती सा वहति विदर्भा नदी यत्र ॥ नलचंपू, ६.६६

 वरदातट म्हणजे वऱ्हाड म्हणजे विदर्भ. त्यालाच कवीने महाराष्ट्र म्हटले आहे व ते वीरपुरुषांचे राष्ट्र आहे, असा त्याचा गौरव केला आहे. शिवाय विदर्भा नदीला दक्षिण सरस्वती म्हणून महाराष्ट्रीयांच्या विद्यासंपन्नतेचाही त्याने निर्देश केला आहे.
 राजशेखराचा उल्लेख वर आलाच आहे. बालरामायणात त्याने महाराष्ट्राचा ( विदर्भाचा ) 'सारस्वती जन्मभूः' असा रामाच्या तोंडून उल्लेख केला आहे. त्याला महाराष्ट्राचा किती अभिमान होता हे तेथे दिलेल्या इतर वचनांवरूनही स्पष्ट होईल.
 कोऊहल कवीच्या लीलावई काव्यातला उताराही वर दिला आहे. कुवलयमालाकार उद्योतनसूरी व चिनी प्रवासी ह्युएनत्संग यांनी महाराष्ट्राचे व तेथील शूर लोकांचे केलेले वर्णन तेथे दिले आहे. या सर्व उताऱ्यांवरून या भूमीतील लोकांना अस्मिता प्राप्त झाली होती हे स्पष्ट दिसून येते. या भूमीत नित्य कृतयुग असते, येथे कलियुग कधी येतच नाही, ही भूमी म्हणजे धर्माचा आधार आहे, येथली सृष्टी म्हणजे ब्रह्मदेवाची सृष्टिरचनेची शाळा आहे, असे उद्गार कवींच्या मुखांतून निघतात, तेव्हा त्या लोकांच्या राष्ट्रीय अभिमानाविषयी शंका घेण्याचे कारण नाही.

स्वभाषा
 देशाचा जसा त्या काळचे लोक अभिमान बाळगीत होते तसाच किंवा त्याहूनही उत्कट असा आपल्या भाषेचाही अभिमान त्यांच्या मनात होता, हेही विपुल प्रमाणा- वरून दिसून येते.
 श्रीरामशर्मा हा प्राकृत भाषेचा व्याकरणकार होता. त्याच्या मते महाराष्ट्री ही सर्व भाषांच्या मूलस्थानी असून ती महाराष्ट्रातच निर्माण झालेली आहे. शौरसेनी, मागधी या, त्याच्या मते, महाराष्ट्रीपासून निर्माण झाल्या आहेत.

सर्वासुभाषास्विह हेतुभूतां भाषां महाराष्ट्रभुवां पुरस्तात् |
निरूपयिष्यामि यथोपदेशः श्रीरामशर्माहमिमां प्रयत्नात् ॥

 (रामतर्कवागीश, प्रा. ल. स्तबकर अवतरण - 'मराठी भाषा उद्गम आणि विकास', कृ. पां कुळकर्णी. पृ. ९३ )
 राजशेखराने जसा महाराष्ट्राचा गौरव केला आहे तसाच त्याने, तो स्वतः संस्कृत- पंडित असूनही, महाराष्ट्री प्राकृताचाही केला आहे.

परुस सक्कअ पाऊअ बंधोवि होई सुकुमारो ।
पुरिस महिलाणं जेत्तिअमिहंतरं तेत्तिअमिमाणं ॥

 संस्कृत कर्कश तर प्राकृत भाषा सुकुमार आहे. राकट पुरुष व नाजूक स्त्री यांच्यात जेवढे अंतर असते तेवढे या दोन भाषांत आहे.
 धर्मोपदेशमाला हा नवव्या शतकातील ग्रंथ आहे. त्यात 'मरहठ्ठ भासा ' हिचा विशेष गौरव केला आहे.

सलिलयपदसंचारा, पयडिय मयणा, सुवण्ण रयणेल्ला
मरहठ्ठ भासा कामिणि य अडवीय रेहन्ती.

 मराठी भाषा सुवर्णरचनावती, सललितपदसंचारा, प्रकटितमदना अशी कामिनी आहे. ती आपल्या वैभवात विराजत आहे.
 'गउडवहो' या प्राकृत महाकाव्याचा कर्ता वाक्पतिराज याच्या पुढील उद्गारांवरून प्राकृत - महाराष्ट्री- भाषेचा त्याचा अभिमान व्यक्त होईल.

णवमत्थ दंसणं संनिवेस सिसिराओं बंध रिद्धिओ ।
अविरलमणिओ आभुवनबंधमिह णवर पयमक्ति ॥

 सृष्टीच्या आरंभापासून आजपर्यंत अभिनव आशय, समृद्धरचना आणि मृदुशब्दमाधुर्य या बाबतीत प्राकृत भाषा सर्व भाषांत श्रेष्ठ आहे. त्यानेच पुढे म्हटले आहे की जल हे सागरापासून निर्माण होते व ते सागरातच विलीन होते. त्याप्रमाणे सर्व भाषा प्राकृतातून निर्माण होतात व प्राकृतातच विलीन होतात. प्राकृतापासून मनाला अनिर्वचनीय आनंद होतो. त्या आनंदाने नेत्र विकसित होतात व तृप्तीने मुकुलितही होतात.
 'वज्जालग्ग' हा जयवल्लभाने रचलेला ग्रंथ गाथासप्तशतीसारखाच सुभाषित- भांडाराच्या स्वरूपाचा आहे. त्यात कवी म्हणतो,

ललिए महुरक्खए जुबई-यण बल्लहे ससिंगारे |
संते पाइय कव्वे को सक्कइ सक्कयं पढिऊं ? ॥

 लालित्यपूर्ण, मधुर युवतींना प्रिय असलेले व शृंगाररसयुक्त प्राकृत काव्य उपलब्ध असताना संस्कृत कोण वाचणार ?
 महाराष्ट्री प्राकृतातील पहिले अभिजात काव्य म्हणजे 'गाथासप्तशती' हे होय. त्यात आरंभीच

अमिअं पाऊअ काव्यं पढिऊं सोऊं अजेण अणंति
कामस्स तत्ततंतिं कुणतिं ते कहं ण लज्जति ?

 असा प्राकृत भाषेचा व काव्याचा अभिमान कवीने प्रगट केला आहे. तो म्हणतो- प्राकृत काव्य शृंगाररसाच्या पूर्णतेमुळे अमृतरूप आहे. ( त्या प्राकृत काव्यास अशिष्ट समजून ) ते पढणे व ऐकणे जे जाणत नाहीत त्यांना मदनाची तत्त्वचिंता करताना लज्जा कशी वाटत नाही ?
 कवीने प्रगट केलेला प्राकृत काव्याबद्दलचा हा अभिमान संस्कृत कवींनाही मंजूर होता, हे अनेक संस्कृत कवींनी गाथासप्तशतीचा जो गौरव केला आहे त्यावरून दिसून येते. 'कादंबरीचा' कर्ता सुप्रसिद्ध कवी बाण म्हणतो,

अविनाशिनमग्राम्यं अकरोत् सातवाहनः ।
विशुद्धजातिभिः कोशं रत्नैरिव सुभाषितैः ।

 प्राकृत भाषेचा हा अभिमान तिचे सौकुमार्य, सौंदर्य एवढ्यापुरताच मर्यादित नाही. शिक्षण, लोकव्यवहार या सर्व क्षेत्रात प्राकृताचा आश्रय केला पाहिजे असे तिच्या उपासकांचे म्हणणे आहे.

प्राकृत हे मूळ
 संस्कृताचा अपभ्रंश होऊन प्राकृत निर्माण झाली हे प्राकृताच्या अभिमान्यांना मुळीच मान्य नाही. संस्कृत पंडितांचा मात्र तसा आग्रह आहे. संस्कृत ही दैवी भाषा व तिच्यापासून जन्मलेली ती प्राकृत असे दण्डीने म्हटले आहे. चंड, वाग्भट या पंडितांचेही असेच मत आहे. इतकेच नव्हे, तर प्राकृताचा प्रसिद्ध व्याकरणकार हेमचंद्र हाही 'प्रकृतीः संस्कृत, तद्भवं, तत् आगतं - प्राकृतम् ' असेच म्हणतो. पण प्राकृताचे अभिमानी निराळी व्युत्पत्ती व उपपत्ती सांगतात. प्राक् - पूर्व-कृत- प्राकृतम् । पूर्वी, संस्कृतच्या आधी झालेली, ती प्राकृत. किंवा लोकव्यवहार म्हणजे प्रकृती - तत्रभवं सव प्राकृतम् | अशी व्याख्या ते देतात. त्यांची हीच विचारसरणी आज पंडितांना मान्य झालेली आहे. संस्कृत ही सर्व लोकांची भाषा असणे कदापि शक्य नाही. शास्त्री- पंडित ती तत्त्वविवेचनासाठी, ग्रंथरचनेसाठी योजीत असले तरी लोकव्यवहार संस्कृतात होणे शक्य नव्हते. लोकांना तत्त्वनिरूपण समजावे म्हणून प्राकृताचाच आश्रय केला पाहिजे, आणि अशी लोकसुलभ जी भाषा तीच श्रेष्ठ, असा अभिमान अनेक पंडितांनी मागल्या काळीसुद्धा प्रगट केलेला आहे. जैन पंडितांनी तर या बाबतीत संस्कृतवादी लोकांचा धिक्कार केला आहे.

संस्कृता प्राकृता चेति भाषे प्राधान्यमर्हतः ।
तत्रापि संस्कृता तावद् दुर्विदग्ध हृदि स्थिता ॥

वास्तविक संस्कृत व प्राकृत दोन्ही भाषा महत्त्वाच्या आहेत. पण दुराग्रही संस्कृत पंडित तरीसुद्धा संस्कृतलाच कवटाळून बसतात.

बालस्त्रीमंदमूर्खाणां नृणां चारित्रकांक्षिणाम् |
अनुग्रहार्थं तत्त्वज्ञैः सिद्धान्तः प्राकृतः कृतः ॥

बाल, स्त्रिया, जडबुद्धी, मूर्ख यांच्यासाठी, धर्मनीती जाणण्याची इच्छा असलेले यांच्यासाठी, तत्त्ववेत्त्यांनी प्राकृतात धर्मसिद्धान्त सांगितले आहेत, असे सांगून हा पंडित पुढे म्हणतो, ही भाषा बालांना अती सद्बोधकारिणी आहे, कर्णपेशला - श्रुति- मधुर आहे, तरी हटाग्रही लोकांना ती मान्य होत नाही.
 'कुमारपाल' या काव्याचा कर्ता म्हणतो, ' आदी पुरुषाने प्रथम १४ स्वर व ३८ व्यंजने करून प्राकृत भाषा केली आणि मग तीवर संस्कार झाल्यामुळे संस्कृतभाषा झाली. तेथून पुढे अनेक भाषाभेद झाले. तेव्हा, सकलशास्त्रमूलं मातृकारूपं प्राकृतमेव प्रथमम् । '
 प्राकृत ही सुलभ असल्यामुळे अध्यापनासाठी तिचा उपयोग संस्कृतावरोवर करावा, असा उपदेश काही प्राचीन पंडितांनी केलेला आढळतो.

नात्यंतं संस्कृतेनैव, नात्यंतं देशभाषया ।
कथा गोष्टीषु कथयन् लोके बहूमतो भवेत् । कामसूत्रे १, ४, १०

केवळ संस्कृत नव्हे, केवळ देशभाषा ( प्राकृत ) नव्हे, तर दोहींचा अवलंब करून जो निरूपण करतो त्यालाच लोकात बहुमान मिळतो.

संस्कृतैः प्राकृतैर्वाक्यैः यः शिष्यमनुरूपतः ।
देशभाषाद्युप यैश्च बोधयेत् स गुरुः स्मृतः ॥ विष्णुधर्मोत्तरे.

प्रसंगाप्रमाणे संस्कृत, प्राकृत व देशी भाषा यातून जो शिष्यांना बोध करील त्यालाच गुरू म्हणावे.
 संस्कृत ही या काळात सर्वसुलभ नव्हती, अध्यापनासाठी प्राकृत व देशी भाषा यांची गरज होती. यावरून लोकात प्राकृत व देशी याच प्रचलित होत्या हे स्पष्ट दिसते. महाभारतातही-

नाना चर्मभिराच्छन्ना, नाना भाषाश्च भारत ।
कुशला देशभाषासु जल्पन्तोऽन्योन्यमीश्वराः ॥

नाना वर्णाचे, अनेक भाषा बोलणारे, देशी भाषांमध्ये प्रवीण असे अनेक राजे एकमेकांशी बोलतात, असे वर्णन आले आहे. यावरून प्राकृताच्या लोकप्रियतेविषयी शंका राहात नाही.
 इ. सनाच्या पाचव्यासहाव्या शतकात मागधी, महाराष्ट्री या भाषांचेही रूप बदलू लागले व त्यांचे अपभ्रंश त्या त्या प्रदेशात रूढ होऊ लागले, हे मागे सांगितलेच आहे. ते रूढ झाल्यावर लोकांना त्यांचाही असाच अभिमान वाटू लागला. महाराष्ट्री अपभ्रंशाला देशी हे नाव त्या वेळी रूढ होते व तेच पुढे प्रारंभीच्या मराठी कवींनी मराठीला लावले हे, डॉ. कोलते यांच्या आधारे, मागल्या प्रकरणी सांगितलेच आहे. त्या अपभ्रंश-देशी-भाषेचा अभिमान साहित्यात कसा दिसून येतो ते पुढील उताऱ्यावरून कळून येईल.

वायरणु देशी सद्दत्थगाढ | छंदालंकारविसाल पोढ ॥

 देशीभाषेत व्याकरण आहे, गाढ शब्दार्थ आहे, ती छंदालंकारांनी संपन्न आहे आणि प्रौढ आहे. (पासणाह चरिऊ- पद्मदेव ).

सक्कअवाणी बहुअ न भावइ | पाऊनरसको मम्म व पावइ ।
देसिल वअना सब जन मिट्टा । तै तैसन जापओ अवहट्टा ॥

 या श्लोकाच्या उत्तरार्धात, देशी वचने सर्व लोकांना गोड वाटतात म्हणून त्याच अपभ्रंशात (अवहट्टा) मी रचना करतो, असे कवीने म्हटले आहे. (कीर्तिलता-विद्यापती ठक्कुर ). [ विक्रमस्मृती, मराठीचे माहेर - डॉ. कोलते यांनी दिलेले उत्तर. ]
 नद्या, डोंगर, समुद्र यांनी किंवा भाषेमुळे प्रदेश जरी पृथक झाला तरी तेवढ्यामुळे त्याला भिन्न अस्मिता आली असे होत नाही. त्या पृथकपणाची जाणीव तेथील समाजाला झाली, आपण भिन्न आहो, इतरांहून गुणसंपदेने श्रेष्ठ आहो, ही अहंता त्याच्या ठायी उद्भवली, आणि या अहंतेमुळे श्रेष्ठ कर्तृत्व तो प्रकट करू लागला म्हणजे मगच त्याच्या भूमीला अस्मिता प्राप्त झाली असे म्हणणे युक्त ठरते. महाराष्ट्र भूमीला इ. पू. दुसऱ्या शतकापासूनच ती कशी प्राप्त होत होती, ही भूमी, तिची भाषा व येथल्या लोकांची गुणसंपदा यांचा अभिमान तेव्हापासूनच येथे कसा फुलत होता आणि इतरांनाही तो कसा सार्थ वाटत होता, हे येथवर आपण पाहिले. आता या अस्मितेचे सातत्य ज्या राजसत्तेमुळे टिकून राहते तिचा विचार करावयाचा आहे.
 
 
महाराष्ट्र संस्कृती  (१९७९) 
साहित्यिक पु. ग. सहस्रबुद्धे


१.
महाराष्ट्राची पृथगात्मता
 



अस्मितेतून संस्कृती
 मानव हा येथून तेथून सर्व एकच असे नेहमी म्हटले जाते. आणि याच्या उलट प्रत्येक मनुष्याला स्वतंत्र व्यक्तिमत्त्व असते, तो इतरांहून अनेक दृष्टींनी भिन्न असतो, असेही म्हटले जाते. यात परस्परविसंगती आहे असे बाह्यतः वाटत असले तरी, या दोन्ही विधानांना अर्थ आहे. वर्ग, वंश, धर्म, भूमी, भाषा इत्यादींमुळे मानवामानवांत कितीही भेद निर्माण झाले असले तरी, या कारणांमुळे पृथक झालेल्या मानवसमूहात अनेक समानधर्म असतात. उपजतप्रवृत्ती बहुधा सर्वत्र सारख्या असतात. संघटन- विघटन-प्रवृत्तीही सर्वत्र दिसून येतात. राजशासन, धर्मशासन यांच्या पद्धतीही प्रारंभीच्या काळी बहुतेक मानवसमूहात एकरूपच होत्या, असे इतिहास सांगतो. परमेश्वर, गुरू, मातापिता यांच्याविषयी भक्ती, बंधुभगिनीप्रेम, आतिथ्यशीलता हे सांस्कृतिक गुणही बहुतेक मानवसमूहांत आढळून येतात. हे सर्व ध्यानी घेऊन सर्व मानव एकच आहे असे विधान केले जाते. पण दुसऱ्या दृष्टीने पाहता भिन्न मानवसमूहांत भेदही अनेक दिसतात. आणि त्यांचा मागोवा घेता, एक वंश दुसऱ्यापासून, एक धर्मी दुसऱ्या धर्मीयांपासून, एक भाषिक दुसऱ्या भाषिकांपासून, एक प्रादेशिक समूह दुसऱ्या प्रादेशिकांपासून, एक कुटुंब दुसऱ्या कुटुंबाहून, इतकेच नव्हे तर, एक व्यक्ती दुसऱ्या व्यक्तींपासून अनेक दृष्टींनी अगदी भिन्न आहे, असेही दिसून येते. या भेदामुळेच प्रत्येकाला व्यक्तित्व प्राप्त झालेले असते. हे व्यक्तित्व मनुष्यालाच असते असे नाही. राष्ट्राच्या बाबतीतही तो शब्द योजिला जातो. जर्मनी, फ्रान्स, इंग्लंड यांना स्वतंत्र व्यक्तित्व आहे असे आपण म्हणतो. रशिया व अमेरिका यांचे व्यक्तित्व भिन्न आहे, चीन व भारत यांचे व्यक्तित्व भिन्न आहे, असे इतिहासकार सांगतात. महाराष्ट्र, कर्नाटक, आंध्र, गुजराथ, बंगाल, राजस्थान इ. प्रदेश भारत या एकाच राष्ट्रात आहेत. तरी या प्रत्येक प्रदेशाला स्वतंत्र व्यक्तित्व आहे असे मानले जाते. इतकेच नव्हे, तर या प्रदेशांच्या अभ्यंतरातील गोवा. विदर्भ, सौराष्ट अशा भूभागांचाही, आपल्याला स्वतंत्र व्यक्तित्व आहे, असा दावा असून तो पुष्कळ लोक मान्यही करतात. हे स्वतंत्र व्यक्तित्व कशामुळे आले असे विचारता, धर्म, परंपरा, शौर्यधैर्यादी गुण, विद्या, कला यांतील वैभव या गुणसमुच्चयाचा निर्देश केला जातो. यालाच संस्कृती असे म्हणतात. आणि या अर्थाने, अखिल मानवाची संस्कृती एकच आहे, या विधानाला जसा काही अर्थ आहे, तसाच, प्रत्येक राष्ट्राची संस्कृती निराळी आहे, यालाही अर्थ आहे.
 आणि केवळ अर्थ आहे एवढेच नव्हे, तर महत्त्वही आहे. सर्व मानव तेवढा एक या भावनेला मानवाच्या प्रगतीच्या दृष्टीने जसे महत्व आहे तसेच जर्मन निराळे, इंग्लिश निराळे, बंगाली निराळे, मराठा तेवढा निराळा, गुजराथी निराळे, त्यांची स्वतंत्र संस्कृती आहे, या भावनेलाही प्रगतीच्या दृष्टीनेच महत्व आहे. इतरांहून आम्ही निराळे आहो, श्रेष्ठ आहो, या भिन्नत्वाच्या जाणिवेतूनच मानवसमूहांचे कर्तृत्व उदयास येते व जोपासले जाते. आजपर्यंत या अस्मितेतूनच अनेक जमातींचे गुण उदयास येऊन संवर्धित झाले आहेत.

संस्कृतींचा समन्वय
 धर्म, वंश, भाषा, प्रदेश यांमुळे मानवांचे नित्य पृथक समूह बनत असतात आणि आपण निर्माण केलेल्या स्वतंत्र संस्कृतीचा त्या समूहांना अतिशय अभिमान असतो. तसे असणे योग्यही असते. त्यावाचून ती संस्कृती टिकणे शक्यच नसते. इतर मानव- समूह त्यांची पृथगात्मता नष्ट करून त्या समूहांची संस्कृती उच्छेदण्यास सदैव टपलेले असतात. अशा स्थितीत प्रत्येक मानवसमूह आपल्या पृथगात्मतेचे रक्षण करण्यासाठी प्राणार्पणही करण्यास सिद्ध होतो. पण वरील कारणांमुळे पृथक झालेला मानवसमूह दरवेळी स्वयंपूर्ण होऊन स्वतंत्रपणे जगण्यास समर्थ असतोच असे नाही. शिवाय शेजारी शतकानुशतके राहिलेले समाज या पृथगात्मतेच्या भावनेने परस्परांशी नित्य संघर्ष करून तिसऱ्या दूरच्या आक्रमकापुढे बळी पडण्याचाही संभव असतो. म्हणून जगातल्या बहुतेक भूभागांत प्रत्येक मानवसमूहाला शेजारच्या अन्य मानवसमूहांशी संबंध जोडून सर्वांनी मिळून एकात्म समाज घडविणे अपरिहार्य होऊन बसते. ही एकात्मता साधताना सर्व पृथक समूहांच्या पृथक संस्कृतींचा आदर करून त्यांचा समन्वय साधणारे धुरीण लाभले तर तो समाज खरा एकात्म आणि संघटित होतो व त्यामुळेच बलशाली होतो. नाहीतर एकात्मता साधत नाही व साधली तरी तिला लवकरच तडे जाऊन समाज दुबळा होतो व ज्या दुसऱ्या समूहांनी अशी अभंग एकात्मता साधली असेल त्यांच्या भक्ष्यस्थानी पडतो.
 गेली शंभरदीडशे वर्षे अखिल भारताचे एक राष्ट्र घडविण्याचे येथील थोर समाजनेत्यांचे अखंड प्रयत्न चालू आहेत. त्यांना बरेचसे यशही लाभले आहे, भारताला स्वातंत्र्य प्राप्त झाले ते या प्रयत्नांचेच फळ आहे. पण त्याच वेळी मुस्लिम समाज हा भारताशी एकात्म न होऊ शकल्यामुळे पाकिस्तान निर्माण होऊन भारत हे राष्ट्र खंडित झाले. पण हे दुर्देव येथेच संपले नाही. आज दक्षिण भारतातील तामिळनाडू, केरळ हे प्रदेश भारतापासून फुटून निघू पहात आहेत. काश्मीर, आसाम यांची हीच वृत्ती आहे. शिवाय आपापल्या प्रदेशापासून फुटून निघून सवता सुभा स्थापावा अशी गोवा, विदर्भ, सौराष्ट्र या भूविभागांची आणि जातीय मुस्लिम, नागा मिझोसारखे ख्रिश्चन समूह, तारासिंगांचे शीख अनुयायी यांची वृत्ती आहे. आमची संस्कृती भिन्न आहे, या भारतीय राष्ट्रात तिची गळचेपी होत आहे, आम्ही असेच येथे राहिलो तर ती समूळ नष्ट होऊन जाईल, असे त्यांचे म्हणणे आहे. अशा वेळी मानवसमूह पृथक कशाने होतात, त्यांची संस्कृती भिन्न असते म्हणजे काय, भिन्न संस्कृतीची जाणीव केवळ आभास असतो की, ती सत्य असते, अशी ती असली तर तिच्या रक्षणार्थं स्वतंत्र सत्ता, स्वतंत्र शासन असणे आवश्यक असते की काय, या प्रश्नांचा खोलवर विचार होणे आवश्यक आहे. भारतातील बंगाल, बिहार, आसाम, पंजाब, गुजराथ, महाराष्ट्र, कर्नाटक, आंध्र, तामिळनाडू या प्रदेशांना आपल्या पृथगहंकाराची जाणीव दीर्घकाळापासून आहे. या प्रदेशांतील पंडितांनी आपापल्या प्रदेशांचे राष्ट्राचे - इतिहास लिहून ती दृढही केलेली आहे. भाषावार प्रांतरचना होऊन प्रादेशिक राज्ये झाल्यापासून या इतिहासलेखनाला पुन्हा उत्तेजन मिळून या पृथगात्मतेचे म्हणजेच आपापल्या पृथक संस्कृतीचे जे वैभव त्याचे गुणगान करावे अशी प्रवृत्ती वाढीस लागलेली आहे. या प्रवृत्तीत आक्षेपार्ह असे काहीच नाही. ती स्वागतार्हच आहे. भारताचे वैभव हे या सर्व राज्यांचे वैभव आहे. तेव्हा या वैभवात आपला अंशभाग किती, भारताच्या संस्कृतिसंवर्धनाचे आपल्या प्रदेशाला श्रेय किती हे सांगून त्याचा योग्य तो अभिमान प्रदेशराज्यांनी वाहिला तर ते श्लाध्यच आहे. पण तसे करताना आपण भारत राष्ट्राचे एक घटक आहोत या सत्याकडे कधीच दुर्लक्ष होता कामा नये. नाहीतर आधीच शिथिल होत चाललेल्या अखिल भारतनिष्ठेची हानी होईल. आपापले इतिहास लिहिताना सत्यापलाप करावा, सत्याला मुरड घालावी, काही सत्य झाकून ठेवावे असा याचा अर्थ नाही. मागल्या काळी या देशात भिन्न भाषिकांचे, वर्णांचे, वंशांचे, जातींचे अगदी प्राणांतिक संघर्ष झाले आहेत. त्यांचे इतिहास बदलून लिहावे असेही नाही. पण आपापले पृथक वैभव वर्णीत असताना आपणांला सर्वांना भारतनिष्ठा जोपासावयाची आहे याचा विसर पडू देणे इष्ट नव्हे, याबद्दल दुमत होईल असे वाटत नाही.
 'महाराष्ट्र संस्कृती' चा इतिहास या ग्रंथात जो द्यावयाचा आहे तो लिहिताना हेच तत्त्व सांभाळण्याचा आटोकाट प्रयत्न केलेला आहे. आणि वाचकांनी ग्रंथ वाचताना ही दृष्टी ठेवूनच तो वाचावा अशी ग्रंथकर्त्याची त्यांना विनंती आहे.

*  *  *

 महाराष्ट्राचा सांस्कृतिक इतिहास हा या ग्रंथाचा विषय आहे. मराठ्यांच्या संस्कृतीचे दर्शन या ग्रंथात घडवावयाचे आहे. पण विषयाला प्रारंभ करण्यापूर्वी महाराष्ट्र व संस्कृती या दोन शब्दांची विवक्षा स्पष्ट करून घेणे अवश्य आहे. या विवक्षा निश्चित झाल्या की विषयाचा पूर्ण व्याप डोळ्यांपुढे उभा राहील.

चतुःसीमा
 आज महाराष्ट्र याचा अर्थ निश्चित झालेला आहे. त्याच्या चतुःसीमा ढोबळपणे सर्वमान्य झालेल्या आहेत. बेळगाव, कारवार, गोवा यांच्याविषयी वाद असला तरी तो राजकीय क्षेत्रातला आहे; सांस्कृतिक इतिहासाच्या दृष्टीने त्याला महत्त्व नाही. हे ध्यानात घेऊन महाराष्ट्र म्हणजे कोणता प्रदेश हे निश्चितपणे आज सांगता येईल. गोवा ते दमण ही रेषा याची पश्चिम सीमा आहे. ती सिंधुसागराने निश्चित केली आहे. सातपुडा व त्याच्या पायथ्याशी वाहणारी तापी नदी ही याची उत्तर सीमा आहे. ती साधारण ८० रेखांशापर्यंत जाते. महाराष्ट्राची पूर्व सीमा अशी सरळ नाही. गोवा-कारवारपासून ती सोपानाप्रमाणे पायरीपायरीने चढत जाते. कारवार, सोलापूर बेदर, माहूर, चांदा, भंडारा अशा त्या सोनानपरंपरेतील पायऱ्या आहेत. तेव्ह, आजच्या महाराष्ट्रभूमीच्या सीमा अशा निश्चित आहेत. पण आपल्याला इ. स. पूर्व तिसऱ्या शतकापासून आजमितीपर्यंत सुमारे दोन सव्वादोन हजार वर्षाच्या संस्कृतीचा इतिहास पहावयाचा आहे. तेव्हा त्या काळी महाराष्ट्राच्या सीमा कोणत्या होत्या, त्या कशाने निश्चित झाल्या होत्या, त्या प्रारंभकाळी या भूमीला हेच नामाभिधान होता काय, असल्यास ते कशावरून पडले होते इ. प्रश्न उपस्थित होतात. त्या काळापासून इतिहास लिहावयांचा तर या प्रश्नांचा निर्णय आधी केला पाहिजे. म्हणजेच महाराष्ट्र या शब्दाची विवक्षा आधी निश्चित केली पाहिजे.

संस्कृतीची व्याख्या
 संस्कृती या शब्दाचे तसेच आहे. मानवाची भौतिक व मनोमय सृष्टी म्हणजे संस्कृती, आध्यात्मिक व आधिभौतिक शक्तींना सामाजिक जीवनास उपयुक्त बनविण्याची कला म्हणजे संस्कृती, राष्ट्रातील विद्वानांचे, ऋषींचे, धर्मज्ञांचे विचार, त्यांची ध्येये, त्यांचे मार्ग व त्यांना अनुसरून राष्ट्रात झालेला आचार यांनी संस्कृती बनते, अशा संस्कृतीच्या निरनिराळ्या व्याख्या पंडितांनी केलेल्या आहेत. इंग्रजीत कल्चर आणि सिव्हिलिझेशन असे दोन संस्कृतिवाचक शब्द आहेत. सिव्हिलिझेशन याचा अर्थ भौतिक प्रगती असा अलीकडे केला जातो. उद्योगधंदे, गिरण्या कारखाने, शास्त्रीय शेती, वाहतुकीची साधने, सुखसोयी वाढविणारी अनेक प्रकारची यंत्रे, अनंतविध शस्त्रास्त्रे यांचा सिव्हिलिझेशनमध्ये अंतर्भाव होतो. मनोमय सृष्टी ती याहून निराळी. धर्म, तत्त्वज्ञान, समाजशास्त्र, राजनीती, साहित्य, कला, विज्ञान यांचा या सृष्टीत समावेश होतो. कल्चर याचा हा अर्थ आहे. पण वर दिलेल्या व्याख्या पाहिल्या म्हणजे कल्चर व सिव्हिलिझेशन या दोहींचाही अंतर्भाव मराठी 'संस्कृती ' या शब्दात केलेला आहे, असे दिसून येईल. त्यातल्या त्यात मानवाची भौतिक व मनोमय सृष्टी ही व्याख्या सोपी व सुटसुटीत वाटते. तिने संस्कृती शब्दाची विवक्षा स्पष्ट होते. महाराष्ट्र संस्कृतीच्या या इतिहासात तीच अभिप्रेत आहे. या भूमीत निर्माण वा रूढ झालेले धर्मशास्त्र, येथील तत्त्वज्ञान, येथील राजपुरुषांनी अवलंबिलेली राजनीती, त्यांचे पराक्रम, त्यांची साम्राज्ये, येथे निर्माण झालेली भौतिकशास्त्रे, येथली साहित्यसृष्टी, कलासृष्टी येवढ्या व्यापक अर्थाने संस्कृती हा शब्द येथे योजिलेला आहे.

भाषातत्त्व
 आज महाराष्ट्र हा भारतीय संघराज्याचा एक घटक आहे. गुजराथ, पंजाब, उत्तर प्रदेश, बंगाल, आसाम, म्हैसूर, आंध्र याप्रमाणेच महाराष्ट्र हाही एक भारताचा प्रधान घटक आहे. आपल्या संघराज्याचे घटक असे हे जे चौदा प्रधान प्रदेश ते प्रामुख्याने भाषातत्त्वावर भिन्न झालेले आहेत. गुजराथी, बंगाली, कन्नड, तामीळ इ. चौदा प्रमुख भाषा त्या त्या प्रदेशात बोलल्या जातात. आणि एक प्रदेश दुसऱ्या प्रदेशापासून निराळा झाला आहे तो भाषेमुळेच होय. धर्म किंवा वंश या वर्गीकरणाच्या तत्त्वांचा येथे काही संबंध नाही. हे भेद त्या तत्त्वांवर केलेले नाहीत. भारतात भिन्न धर्मांचे व वंशाचे लोक आहेत. नाही असे नाही. पण बहुतेक सर्व प्रदेशांत या सर्व धर्मांचे व वंशांचे लोक राहतात. आणि ते त्या त्या प्रांताची भाषा बोलतात. तेव्हा प्रदेश- विभागणी भाषातत्त्वावर झाली आहे, हे उघड आहे. अर्थात महाराष्ट्राची ही भिन्नता याच तत्त्वावर प्रस्थापित झाली आहे. संयुक्त महाराष्ट्राची प्रस्थापना झाली त्या वेळी विदर्भ, मराठवाडा यांचा समावेश महाराष्ट्रात करण्यात आला तो तेथील लोक मराठी भाषिक आहेत म्हणूनच आणि आज बेळगाव, कारवार व गोवा यांचा समावेश महाराष्ट्रात करण्यात यावा, असा महाराष्ट्रीयांचा आग्रह आहे याचेही कारण हेच आहे. त्याला विरोध होत आहे त्याची कारणे राजकीय आहेत. सांस्कृतिक नाहीत. तेव्हा मराठी भाषिकांचा प्रदेश म्हणूनच महाराष्ट्र हा आज निराळा झाला आहे हे निर्विवाद आहे.
 पण मराठी भाषिकांची भूमी म्हणजे महाराष्ट्र हे समीकरण निश्चित झाले ते साधारणतः इ. सन १२०० च्या सुमारास मराठी भाषेची उत्पत्ती विद्वानांच्या मते इ. स. ८००-१००० च्या सुमारास झाली. तिच्यातील 'विवेकसिंधू' हा पहिला ग्रंथ इ. स. ११८८ या साली निर्माण झाला, आणि त्याच वेळी यादवांच्या साम्राज्याची स्थापना झाली. पुढील शंभर वर्षात महानुभाव पंथाचे अनेक ग्रंथ रचले गेले आणि १२९० च्या सुमारास ज्ञानेश्वरीचा अवतार झाला. म्हणजे साधारणपणे तेराव्या शतकात स्वतंत्र निराळी मातृभाषा यामुळे महाराष्ट्राची अस्मिता निश्चित झाली. तेव्हा इ. स. १२०० पासून या भूमीतील संस्कृती ती महाराष्ट्राची संस्कृती असे म्हणणे यथार्थ आहे. पण इ. स. पू. ३०० पासून या संस्कृतीचा इतिहास पाहावयाचा आहे असे वर म्हटले आहे. तेव्हा इ. स. १२०० च्या पूर्वीचा हा जो १५०० वर्षांचा काळ, त्या काळातल्या या भूमीच्या संस्कृतीला महाराष्ट्र संस्कृती असे म्हणणे कितपत युक्त होईल असा प्रश्न उद्भवतो.

पृथगात्मतेचा मागोवा
 प्राचीन काळी भारतात आर्यांची संस्कृती नांदत होती अशी वर्णने प्राचीन ग्रंथांत आहेत. प्रारंभीच्या काळात आर्य लोक विंध्य पर्वताच्या दक्षिणेस आले नव्हते. त्यांच्या वसाहती सर्व उत्तर भारतातच झाल्या होत्या. पण त्या वेळी सर्व उत्तर भारताचा आर्यावर्त असा एक प्रदेश म्हणून उल्लेख होत असे. त्यातील भूभागांचा मगध, कोसल, कुरुपांचाल, कांबोज असा उल्लेख प्राचीन ग्रंथांत होत असे. पण त्यांपैकी कोणत्याच भूभागाला पृथगात्मता आलेली नव्हती. त्याची काही भिन्न संस्कृती आहे, प्रत्येकाची निराळी अस्मिता आहे अशी जाणीव कोणाला झाल्याचे प्राचीन ग्रंथांत दिसून येत नाही. सर्व आर्यावर्त हा येथून तेथून एक अशीच तत्कालीन लोकांची, धर्मवेत्त्यांची, ग्रंथकारांची, राज्यकर्त्यांची भावना होती. त्यानंतर इ. स. पू. १००० च्या सुमारास आर्यांचा दक्षिणेत प्रवेश झाला. पण तरीही भारताची विभागणी अशी झाली नाही. अखिल भारत हा एकच देश व त्याची सर्वव्यापक अशी एक संस्कृती अशीच सर्वांची धारणा होती. विंध्याच्या दक्षिणेच्या प्रदेशाला त्या वेळी दक्षिणापथ म्हणत. आणि मागल्या काळाप्रमाणेच या काळातही कलिंग, आंध्र, सुराष्ट्र, आनर्त, अपरान्त, कुंतल, देवराष्ट्र, असे दक्षिणापथातील भिन्न भूभागांचे निर्देश त्या काळच्या ग्रंथांत केले जात. पण तरीही त्यांना पृथगात्मता असल्याची कोणतीही लक्षणे त्या काळच्या ग्रंथांवरून दिसून येत नाहीत.
 मग ही पृथगात्मता केव्हापासून आली ? हा महाराष्ट्र, हा कर्नाटक, हा आंध्र, हा तामिळनाडू, हा गुजराथ, हा बंगाल असा निर्देश करणे आणि त्यांची संस्कृती पृथक आहे, स्वतंत्र आहे असे विधान करणे, हे केव्हापासून युक्त ठरेल ? आम्हा भारतीयांची संस्कृती भिन्न आहे, ती फार संपन्न आहे व फार प्राचीन आहे असा अभिमान आपण वाहतो त्यावेळी भारतातल्या प्रत्येक प्रदेशाचा नागरिक आपल्या आजच्या संस्कृतीचा धागा वेदकालापर्यंत मागे नेऊन भिडवतो. संस्कृत भाषा, वेद, उपनिषदे, महाभारत, रामायण इ. ग्रंथ, हिंदुधर्म, विवाहउपनयनादी संस्कार, चातुर्वर्ण्यसंस्था, शिव-राम कृष्णादी दैवते ही या संस्कृतीची प्रधान लक्षणे आहेत. आणि त्यांची अतूट परंपरा प्रत्येक प्रदेशाला सहज दाखविता येते. ही परंपरा एका बाजूने चीन, रशिया, इजिप्त, अरबस्थान या देशांहून भिन्न आहे, सर्वस्वी भिन्न आहे आणि दुसऱ्या बाजूने भारतातल्या सर्व प्रदेशांना समान आहे, त्यांना व्यापणारी आहे. यामुळेच ही आमची 'भारतीय संस्कृती' आहे या म्हणण्याला अर्थ प्राप्त होतो. तसा अर्थ 'महाराष्ट्र-संस्कृती' या शब्दाला प्राप्त होईल काय ? इ. स. १२००च्या सुमारास भिन्न भाषा, भिन्न राजसत्ता, भिन्न ग्रंथकार व भिन्न धर्मवेत्ते यामुळे महाराष्ट्राची अस्मिता निर्विवाद सिद्ध होते. पण त्यापूर्वीच्या १५०० वर्षांच्या काळात अशी भिन्नतेची काही लक्षणे दिसतात काय ? आजचे आम्ही जे भारतीय तेच वेदकाळी होतो असे म्हणताना आम्हाला जसा संस्कृतीचा अतूट धागा तेव्हापासून आतापर्यंत दाखविता येतो, चीन, रशिया, मिसर या देशांपासून आम्ही सर्वस्वी निराळे आहोत, आमची संस्कृती भिन्न आहे हे जसे म्हणता येते, तसे आजच्या महाराष्ट्रीयांना भारताच्या अपेक्षेने म्हणता येईल काय ? वंग, कलिंग, गुजराथ, आंध्र, कर्नाटक या प्रदेशांहून आम्ही त्या मागल्या १५०० वर्षांच्या काळातही भिन्न होतो, आमच्या आजच्या संस्कृतीचा धागा अतूटपणे त्या कालखंडाच्या प्रारंभापर्यंत नेऊन भिडविता येतो, आज आम्ही महाराष्ट्रीय आहो तसे त्या वेळीही आम्ही महाराष्ट्रीयच होतो, असे म्हणणे ऐतिहासिक प्रमाणांनी दाखविता आले तरच महाराष्ट्र संस्कृतीचा प्रारंभ इ. स. पू. तिसऱ्या शतकात झाला असे म्हणता येईल तेव्हा या प्रश्नाचा, या पृथगात्मतेच्या सिद्धतेचा प्रथम विचार केला पाहिजे.

ताम्रपाषाणयुग
 सध्या भारतात पुराणवस्तुसंशोधन चालू आहे. या खात्यातर्फे अखिल भारतात आणि त्याचप्रमाणे महाराष्ट्रात सर्वत्र उत्खनन चालू आहे. महाराष्ट्रात गोदावरी, प्रवरा, तापी, भीमा, कृष्णा, मुठा इ. नद्यांच्या काठी जी उत्खनने झाली त्यांच्यावरून या खात्यातील पंडितांनी महाराष्ट्राचा अतिप्राचीनकाळचा इतिहास उभा करण्याचा प्रयत्न केला आहे. अश्मयुग, ताम्रयुग व लोहयुग असे या कालाचे हे पंडित तीन खंड करतात. अश्मयुगाचा काल सुमारे दोन लाख वर्षांपूर्वीचा आहे. महाराष्ट्रातील अश्मपाषाणयुगाचा काल इ. स. पू. १५०० ते इ. स. पू. १००० असा असावा असे या पंडितांना वाटते. लोहयुगास त्यानंतर प्रारंभ होतो. कोल्हापूर, पैठण, कऱ्हाड, नेवासे, नाशिक इ. ठिकाणी या तीन युगांतील अवशेष सापडले आहेत. त्यावरून त्या काळच्या महाराष्ट्राच्या सांस्कृतिक इतिहासाचे चित्र संशोधकांनी रेखाटले आहे. त्यावरून सष्ट असे दिसते की पहिल्या दोन युगांत महाराष्ट्रातील मानवाची संस्कृती इतर मानवांपेक्षा कोणत्याच दृष्टीने निराळी नव्हती. कुऱ्हाड, फरशी, अशा तऱ्हेची अश्मयुगातली दगडाची हत्यारे वरील ठिकाणी सापडली आहेत. गिरमिटा सारखे हत्यार, बाणाचे फाळ, चामडी छिलण्याचे धारदार हत्यार अशीही दगडी हत्यारे सापडतात. त्याचप्रमाणे जनावरांची अश्मीभूत हाडेही सापडतात. अश्मयुगाच्या अगदी उत्तर काळात येथील आदिमानवाने भटकी वृत्ती टाकून देऊन शेतीचा अवलंब केला असे त्या काळच्या हत्यारांवरून व धान्य, भुसा यांच्या अवशेषांवरून दिसते. यानंतर ताम्रपाषाणयुग सुरू होते. या युगातील मानव घरे बांधून राहात होता. रांजण, परात, वाडगा इ. मातीची भांडी करीत होता. त्यावर मोर, हरिण, वाघ यांची चित्रेही काढीत होता. या काळात त्याला तांब्याची हत्यारे करण्याची कलाही अवगत झाली होती. या तांब्याच्या हत्यारांमध्ये तांब्यात कथलाचे मिश्रण केलेले आढळते. धातूंचे मिश्रण करणाची विद्या हे बऱ्याच प्रगतीचे लक्षण आहे
 या युगातील उत्खननात जे अवशेष सापडले त्यांवरून त्या काळच्या मानवाच्या जड, भौतिक संस्कृतीचाच फक्त अंदाज बांधता येतो. त्याच्या मानसिक प्रगतीचा फारसा पत्ता लागत नाही. तरी मरणोत्तर जीवनावर त्याची श्रद्धा असावी असे, मृतांबरोबर गाडगी, मडकी, खेळणी, दागिने इ. वस्तू पुरलेल्या आढळतात, त्यावरून अनुमान होते. त्याचा धर्म हा जादूटोण्याच्या पायरीवरच असावा, असे काही अवशेषांवरून वाटते. यापलीकडे त्याच्या आध्यात्मिक अवस्थेविषयी, वैचारिक धनाविपयी काही ज्ञान उपलब्ध होत नाही.

त्र्यंबकेश्वर ?
 इ. स. पू. १००० वर्षांच्या मागल्या अतिप्राचीन काळातील महाराष्ट्रातील मानवी संस्कृतीचे हे चित्र आहे. पुण्याच्या डेक्कन कॉलेजातील पुराणवस्तुसंशोधन व प्राचीन भारतीय इतिहास या विषयाचे प्राध्यापक डॉ. शां. भा. देव यांनी 'महाराष्ट्रातील उत्खनने ' या आपल्या व्याख्यानमालेत प्राचीन महाराष्ट्र-संस्कृतीचे वरील प्रकारे वर्णन केले आहे. हे वर्णन करताना त्या जागी त्यांनी आवर्जून सांगितले आहे की महाराष्ट्रातील त्या काळची संस्कृती दक्षिणेतील इतर प्रांतांतील संस्कृतीपेक्षा कोणत्याच प्रकारे निराळी दिसत नाही. म्हणून या संस्कृतीकडे प्रादेशिक दृष्टीने बघून चालणार नाही. अश्मयुगातील दगडी हत्यारांचे वर्णन झाल्यावर ते सांगतात की यावरून दिसणारी महाराष्ट्रातील मानवाची संस्कृती त्याच्या इतर भाऊबंदांसारखीच होती. ताम्रपाषाणयुग हे तर तीनसाडेतीन हजार वर्षांपूर्वीचेच आहे. या काळात उत्तरेकडे आर्यांची संस्कृती पुष्कळच विकसित झाली होती. त्या वेळी दक्षिणेत महाराष्ट्रातील मानव सुसंस्कृत व स्थिर जीवन जगत होता, असे स्वतः डॉ. देवांनीच म्हटले आहे. तरीही ताम्रपाषाणयुगातली ही महाराष्ट्रातील संस्कृती ताम्रपाषाणयुगातल्या इतर प्रांतांतल्या व देशांतल्या संस्कृतीपेक्षा भिन्न नव्हती, असेच त्यांनी आपले मत दिले आहे. आणि आपल्याला तर महाराष्ट्राच्या पृथगात्मतेच्या प्रारंभाचा शोध घ्यावयाचा आहे. आकाशातून पर्जन्यकाळी अनंत जलधारा वर्षत असतात. सर्व नद्यांना त्यांतूनच पाणी मिळते. पण एका नदीला आपण गंगा म्हणतो, दुसरीला यमुना म्हणतो, तिसरीला गोदावरी व चौथीला कृष्णा म्हणतो. असे का ? याचे कारण उघड आहे. प्रत्येक नदीचा प्रवाह अगदी भिन्न दिसत असतो. पण हे प्रवाह पाहिल्यामुळेच, प्रथम हे प्रवाह कोठे भिन्न झाले, हे आपल्याला पहावेसे वाटते. कारण मूळ पाणी एकच असले तरी, त्या त्या भूमीतील खनिजामुळे प्रत्येक नदीचे पाणी रंग, रुची, पाचकपणा, जडहलकेपणा, या गुणांच्या दृष्टीने भिन्नरूप झालेले असते. हे भिन्नरूप त्याला प्रथम कोठे प्राप्त झाले याचा शोध घेण्याचा आपण प्रयत्न करतो. आणि मग हिमालयातील गंगोत्री, जम्नाेत्री, सह्याद्रीतील त्र्यंबकेश्वर, महाबळेश्वर ही त्या नद्यांची मूळस्थाने, हे त्यांचे उगम आपल्याला सापडतात व येथून गंगा सुरू झाली, येथून यमुना, येथून गोदा, येथून कृष्णा उगम पावली असे आपण निश्चित करतो. म्हणजे गोदा, कृष्णा यांची पृथगात्मता कोठून सुरू होते याचाच आपण शोध घेतो. या जलवाहिनींच्या प्रवाहांप्रमाणेच भिन्न संस्कृतींच्या प्रवाहाचा शोध घेण्याची आपल्याला जिज्ञासा वाटते; व तिच्यामुळेच कन्नड - संस्कृती, आंध्र-संस्कृती, महाराष्ट्र - संस्कृती यांच्या उगमाकडे आपण प्रवास करीत जातो. महाराष्ट्र - संस्कृतीविषयी तोच प्रयत्न आपल्याला करावयाचा आहे. या संस्कृतीचे त्र्यंबकेश्वर कोठे आहे ते आपल्याला हुडकून काढावयाचे आहे. पैठणनांदेडजवळ गोदावरीचा प्रवाह स्वच्छ निराळा दिसतो. तेथे शंकेला जागा राहत नाही. त्याचप्रमाणे तेराव्या शतकात महाराष्ट्र-संस्कृतीचा प्रवाह मुकुंदराज, चक्रधर, ज्ञानेश्वर, सिंघण, कृष्णदेव, रामदेवराव यादव यांच्या रूपाने स्वच्छ निराळा दिसतो. पण त्याच्याही मागे जाऊन या नदीचा उगम कोठे आहे, त्र्यंबकेश्वरापासून ज्याप्रमाणे गोदावरी निराळी झाली, पृथक झाली, तिचा स्वतंत्र प्रवाह सुरू झाला, असे म्हणता येते, त्याचप्रमाणे महाराष्ट्राच्या संस्कृतीविषयी कोणत्या कालापासून म्हणता येईल ते. आपणास पहावयाचे आहे. आकाशातून पडणाऱ्या जलधारा प्रथम आकाशात सर्वत्र एकरूप, समगुण अशाच असतात. त्यांच्यांत परपस्परव्यवच्छेदकता नसते. त्याप्रमाणेच ताम्रपाषाणयुगाच्या अखेरपर्यंत म्हणजे इ. स. पू. १००० या काळापर्यंत महाराष्ट्रातील संस्कृतिधारा इतर भूप्रदेशांतील त्या युगातील धारांहून भिन्न नव्हत्या, त्या काळातील सर्व प्रदेशांतील ताम्रपाषाणयुगीन संस्कृती एकरूप व समगुणच होत्या, असे उत्खननशास्त्राच्या आधारे आपण वर पाहिलेच आहे. तेव्हा त्यानंतरच्या काळात येऊन आपल्या त्र्यंबकेश्वराचा शोध कोठे लागतो का ते आता पहावयाचे आहे.

भाषा निर्णायक
 आज भारतीय संघराज्यातील प्रारंभी उल्लेखिलेले जे गुजराथ, बंगाल, कर्नाटक, आसाम, ओरिसा, महाराष्ट्र इ. प्रदेश ते भाषाभेदामुळे झाले आहेत हे आपण वर पाहिलेच आहे. या प्रत्येक प्रदेशाच्या परंपरा आता भिन्न झाल्या आहेत. आणि भाषेखेरीज इतरही अनेक कारणांमुळे त्यांना स्वतंत्र व्यक्तित्व प्राप्त झाले आहे. त्यांची भिन्न संस्कृती ती तीच. पण त्यांच्यांतील मुख्य भेदकारण भाषा हेच आहे. धर्म, वंश ही भेदकारणे याला मुळीच प्रेरक झालेली नाहीत. लो. टिळकांनी म्हटले आहे की नर्मदेच्या दक्षिणेकडे महाराष्ट्र कर्नाटक असे जे भेद झालेले दिसतात ने पिंडान्वयापेक्षा भाषान्वयानेच झालेले आहेत. कन्नड व मराठे यांच्यांत रक्तभेद-वंश- भेद मुळीच नाही. धर्मभेद तर नाहीच नाही. तीच गोष्ट उत्तरेतील प्रदेशांची आहे. त्यांच्यांतील काही प्रदेशांतील समाजात भिन्न भिन्न रक्तांचे मिश्रण असेल. पण वंशतः अगदी भिन्न असा कोणताच समाज नाही. आणि त्या भेदामुळे ते प्रदेश भिन्न झाले, असे तर केव्हाच म्हणता येणार नाही. एवंच भारतीय संघराज्यातील घटक प्रदेश हे भाषाभेदामुळेच भिन्न झालेले आहेत यात वाद नाही. कानडी भाषिकांचा तो कर्नाटक व मराठी भाषिकांचा तो महाराष्ट्र असाच भाषाप्रदेशांचा अन्वय सर्वत्र आहे. तेव्हा याच धाग्याचा मागोवा घेत आपण मागल्या काळात प्रवास करीत जाऊन महाराष्ट्र च्या पृथगात्मतेचा आरंभबिंदू शोधणे हे फलदायी ठरण्याचा संभव आहे.
 मराठी भाषेत ग्रंथरचनेला प्रारंभ झाला तो इ. स. च्या बाराव्या शतकाच्या अखेरीस आणि तेराव्याच्या प्रारंभी. अर्थात तिची उत्पत्ती बोली भाषेच्या रूपात यापूर्वी दोनतीन शतके तरी झाली असलीच पाहिजे. तशी ती झाली असल्याचे पुरावे शिलालेखांत व 'कुवलयमाला' सारख्या प्राकृत ग्रंथात सापडतातही. पण अशा रीतीने तिचा प्रारंभकाल फार तर ८ व्या, १० व्या शतकापर्यंत नेता येईल. पण समाजाला, राष्ट्राला पृथगात्मता येण्याच्या दृष्टीने आपण हा शोध घेत आहो. तेव्हा त्या दृष्टीने ग्रंथरचना झाली तोच प्रारंभकाळ आपल्याला मानला पाहिजे. कारण भाषा बोलीच्या रूपात जोपर्यंत आहे तोपर्यंत तिला स्वतःला व तिच्यामुळे ती बोलणाऱ्या समाजाला अस्मिता प्राप्त होणे शक्य नसते. अर्थात या तिच्या स्वरूपाला नदीच्या उगमाप्रमाणे मह्त्त्व आहे यात शंका नाही. पण अशा दृष्टीने पाहिले तरी हा उगम दहाव्या शतकापलीकडे जात नाही. आणि आपल्याला तर त्याच्यापूर्वीच्या १३०० वर्षांच्या काळापर्यंत जावयाचे आहे. या मागल्या काळात महाराष्ट्राची, महाराष्ट्र समाजाची पृथगात्मता सिद्ध करण्यात भाषाभेदाचा आधार सापडेल काय ?
 सुदैवाने तसा आधार, तशी प्रमाणे आज उपलब्ध झाली आहेत.
 आजच्या भारतातील बहुतेक सर्व भाषा संस्कृतोद्भव आहेत असे ढोबळपणे मानले जाते. आणि ढोबळपणे ते खरेही आहे. म्हणजे त्यांचा मूळ उगम संस्कृतात सापडतो हे खरे आहे. पण आमची एकही भाषा प्रत्यक्ष संस्कृतातून उद्भवलेली नाही. ती संस्कृताची वंशज आहे इतकेच खरे आहे. आजची अनेक द्विजकुळे आम्ही रामाचे वंशज, कृष्णाचे, भृगूचे, भारद्वाजाचे वंशज असे सांगतात. त्याचा जो अर्थ तोच येथे घ्यावयाचा. रामाच्या कुळात ते जन्माला आले एवढाच जसा त्यांच्या विधानाचा अर्थ तसा या भाषा संस्कृतच्या कुळात जन्म पावल्या एवढाच अर्थ त्या भाषा संस्कृतोद्भव आहेत या विधानाचा आहे
 मूळभाषा संस्कृत, तिच्यापासून भिन्न प्रदेशांत महाराष्ट्री, शौरसेनी, पैशाची व मागधी या प्राकृत भाषा निर्माण झाल्या; पुढे या प्राकृतापासून देशपरत्वे महाराष्ट्री अपभ्रंश, शौरसेनी अपभ्रंश, पैशाची अपभ्रंश व मागधी अपभ्रंश अशा चार पृथक अपभ्रंश भाषा उद्भवल्या आणि या भिन्न भिन्न अपभ्रंश भाषांपासून आजच्या देशी भाषा किंवा प्रांतिक भाषा जन्मल्या असे आज सर्वसामान्यतः भाषाशास्त्रज्ञांचे मत आहे. यात्र भाषाशास्त्रज्ञांपैकी अनेकांनी असेही मत दिले आहे की मराठी ही महाराष्ट्री अपभ्रंशापासून आणि ही अपभ्रंश भाषा महाराष्ट्री - प्राकृतापासून झालेली आहे. याच्याच जोडीला महाराष्ट्री अपभ्रंश व महाराष्ट्री प्राकृत या भाषा महाराष्ट्राच्या होत्या, त्या या भूमीतच जन्मल्या व विकसित झाल्या, त्या येथील बहुजनांच्या भाषा होत्या आणि ग्रंथकारांच्याही होत्या, हेही मत भाषकोविदांमध्ये बहुमान्य झाले आहे. हे मत जर आपल्याला पटले, स्वीकार्य वाटले तर महाराष्ट्राच्या पृथगात्मतेचा उदय आपल्याला इष्ट त्या प्राचीन काळापर्यंत - इ. पू. पाचव्या सहाव्या शतकापर्यंत- नेऊन भिडविता येईल; आणि महाराष्ट्राला गेली दोन अडीच हजार वर्षे स्वतंत्र इतिहास आहे, स्वतंत्र परंपरा आहे, म्हणूनच स्वतंत्र संस्कृती आहे या म्हणण्याला अर्थ प्राप्त होईल. म्हणून भाषाकोविदांची याविषयीची मते आता आपण विचारार्थ पुढे घेऊ.

प्राकृत-उद्भव
 आर्य हे हिंदुस्थानात सुमारे ४००० वर्षांपूर्वी आले. आणि प्रथम अनेक शतके त्यांनी आपल्या वसाहती उत्तर हिंदुस्थानातच वसविल्या. पाणिनीच्या व्याकरणात विंध्याच्या दक्षिणेकडच्या प्रदेशांचा उल्लेख नाही. त्यावरून त्या काळापर्यंत आर्य दक्षिणेत आले नव्हते, असे विद्वानांचे अनुमान आहे. पाणिनीचा काळ इ. स. पूर्व ८०० असा धरला जातो. त्यानंतर इ. पू. ४०० च्या सुमारास कात्यायन झाला. त्याच्या ग्रंथात दक्षिणेतल्या देशांचे उल्लेख विपुल आहेत. तेव्हा इ. पू. ८०० ते इ. पू. ४०० या दरम्यान आर्य दक्षिणेत येऊन स्थिर वसाहती करून राहिले, असे दिसते. ते महाराष्ट्रात आल्यानंतर त्यांच्या संस्कृत भाषेचा येथल्या मूळच्या समाजाच्या भाषेशी संपर्क येऊन त्यातून महाराष्ट्री ही प्राकृत भाषा निर्माण झाली, असे एक मत आहे. काहींच्या मते उत्तर हिंदुस्थानातच संस्कृताचे भिन्न अपभ्रंश होण्यास प्रारंभ झाला होता. किंबहुना वेदकाळीसुद्धा, ग्रंथाची भाषा वैदिक संस्कृत ही असताना, बहुजनांची एक तिच्याहून निराळी अशी भाषा प्रचलित असली पाहिजे. संस्कृत पंडितांचीसुद्धा प्रत्यक्ष बोलण्याची भाषा तीच असली पाहिजे. यज्ञविधी प्रत्यक्ष चालू असताना त्या काळात प्राकृतात बोलू नये असा एक दंडक होता. त्यावरून धर्मकृत्ये व शास्त्रीय चर्चा ही सोडून अन्यवेळी, वेदकाळीसुद्धा, विद्वान लोक कोठली तरी संस्कृतेतर भाषा बोलत असले पाहिजेत असे दिसते. वेदकाळची ही जी बोली भाषा तीच सर्व प्राकृत भाषांची जननी होय असे एक मत अलीकडे रूढ होत आहे आणि ते बरेचसे सयुक्तिक असावे असे वाटते. आर्य लोक जसजसे भिन्न प्रदेशांत जात आणि आपली राज्ये स्थापून आपल्या संस्कृतीचा प्रसार करीत तसतसा त्यांची जी ग्रांथिक संस्कृत व संस्कृतसम बोलीभाषा तिचा मूळ समाजाच्या भाषांशी संबंध येई आणि त्यातून प्रांतोप्रांती प्राकृत भाषा निर्माण होत. मथुरेभोवतालचा जो शूरसेन प्रांत तेथे अशा प्रकारे निर्माण झालेली ती शौरसेनी, मगधात झालेली ती मागधी व महाराष्ट्रात झालेली ती महारष्ट्री हे मत आता सर्वमान्य होत आले आहे.

महाराष्ट्री महाराष्ट्राची
 कुलगुरु चिंतामणराव वैद्य यांनी आपल्या ठाणे-ग्रंथसंग्रहालय (इ. स. १९०६ ), पुणे - ग्रंथकार संमेलन (इ. स. १९०८ ) व बडोदे - साहित्य संमेलन (१९०९) येथील भाषणात हाच सिद्धान्त मांडला आहे. त्यांनी प्राकृत व्याकरणकारांचा आधारही दिला आहे. विंध्याच्या उत्तरेस शौरशेनी व मागधी या संस्कृताचा अपभ्रंश होऊन निर्माण झाल्या व महाराष्ट्रात संस्कृताचा अपभ्रंश होऊन जी भाषा निर्माण झाली तीच महाराष्ट्री, असे प्राकृत व्याकरणकारांचे मत आहे. यांतील संस्कृताचा अपभ्रंश होऊन प्राकृत भाषा निघाल्या, हे मत आता मान्य नाही. वैदिक संस्कृत व पाणिनीय संस्कृत यांच्या काळी उत्तर भारतातही बहुजनांची निराळी भाषा होती. तिच्यावर संस्कृतचे वर्चस्व होते हे खरे. पण ती भाषा होती. चिंतामणरावांच्या मते आर्य दक्षिणेत आले तेव्हा संस्कृत भाषा मृतच होती. ती फक्त ग्रंथात चालू होती. आर्यांची बोलण्याची भाषा तिच्याहून भिन्न होती. त्या भाषेला महाराष्ट्रात विशिष्ट रूप येऊन तिची महाराष्ट्र प्राकृत भाषा झाली.
 काही पंडितांच्या मते महाराष्ट्री ही शौरसेनीवरून निघाली तर काहींच्या मते ती अर्धमागधीवरून निघाली. डॉ. हन्र्ले या पंडिताच्या मते महाराष्ट्री ही गंगायमुना यांच्या परिसरातील- म्हणजे मोठ्या देशातील भाषा होय. तिला महाराष्ट्री नाव यामुळेच पडले. तिचा महाराष्ट्राशी काही संबंध नाही. डॉ. ग्रियरसन या थोर भाषापंडिताचे प्रारंभी असेच मत होते. पण पुढे त्याचे मत बदलले. डॉ. स्टेन को नौ (ख्रिश्चानिया विद्यापीठ, नॉर्वे) यांनी आपल्या 'महाराष्ट्री व मराठी' या लेखात, प्राकृत व्याकरणकारांचे परंपरागत मत हेच सयुक्तिक आहे व महाराष्ट्र व महाराष्ट्री यांचा दृढ संबंध आहे असे मत मांडले आहे. महाराष्ट्री व मराठी यांचा पाया एकच आहे, असे सांगून डॉ. भांडारकर, गॅरेंज, जाकोबी, कुन्ह, पिशेल, इ. पंडितांचे हेच मत असल्याचे त्याने सांगितले आहे. ( इंडियन ॲंटिक्वेरी, व्हॉ. ३२, इ. १९०३ ) ग्रियरसननेही या मताला नंतर मान्यता दिली, हे वर सांगितलेच आहे.
 महाराष्ट्री ही महाराष्ट्राचीच भाषा होय, असे मत राजाराम रामकृष्ण भागवत यांनीही आपल्या 'प्राकृत भाषेची विचिकित्सा' या निबंधात मांडले आहे. त्यांच्या मते महाराष्ट्री ही संस्कृतापासून उद्भवली हे खरे, पण ती लौकिक संस्कृतापासून नव्हे, तर संस्कृतच्या पूर्वरूपापासून सूक्तांच्या ऋग्-मंत्रांच्या काळीही प्राकृत भाषा होतीच. प्राकृत हा शब्द त्यांच्या मते मूळचा नव्हे. मूळ शब्द पाअड-म्हणजे सोपे. अवघड ते संस्कृत व मूळचे सोपे ते प्राकृत. पाअडचे 'प्राकृत' हे संस्कृतीकरण होय.
 भागवत म्हणतात की, "प्राकृत भाषांची नावे त्या त्या लोकांवरून किंवा त्यांनी बनविलेल्या देशांवरून पडलेली आहेत, यात शंका नको. या दृष्टीने पाहता शालिवाहन, पैठण व महाराष्ट्र यांचा आज २२०० वर्षे अविभाज्य संबंध आहे व 'महाराष्ट्र' या शब्दाचा या भूमीवर आज २२०० वर्षे खडा पहारा आहे. " ( प्राकृत भाषेची विचिकित्सा, आवृत्ती २ री, १९३०- पृ. ५३,५५ )

महाराष्ट्री - अपभ्रंश
 डॉ. पां. दा. गुणे यांनी ' कुलगुरू चिं. वि. वैद्य व मराठी भाषेची उत्पत्ती' या आपल्या लेखमालेत 'महाराष्ट्री प्राकृत' भाषेविषयी थोड्याफार फरकाने असाच अभिप्राय दिला आहे ( वि. ज्ञा. विस्तार, जुलै १९२२, वर्ष ५३ ). ते म्हणतात, ज्या ज्या वेळी व जेथे जेथे नव्या भाषा उत्पन्न झाल्या त्या त्या वेळी तेथे तेथे दोन अगदी भिन्न संस्कृतींच्या, भिन्न भाषांच्या व भिन्न मानववंशांच्या लोकांची टक्कर होऊन त्यांपकी कोणत्याही कारणाने, हीन असतील ते प्रबळांशी मिसळून गेलेले असतात. असे होते तेव्हाच भिन्न भाषा उत्पन्न होतात. अशाच मार्गाने निरनिराळ्या प्राकृत भाषा इ. पू. १०४० पासून इ. पू. ८०२ पर्यंत उत्पन्न होत गेल्या. त्या काळी आर्य लोक बाहेरून आले व त्यांनी हीन संस्कृतीच्या जित लोकांवर आपली संस्कृती व भाषा लादली. मूळचे लोक भिन्न मानवजातीचे व बहुतेक -हीन संस्कृतीचे असल्या- मुळे त्यांच्या तोंडी संस्कृताचे मूळरूप विकृत झाले व निरनिराळ्या प्रांतांत निरनिराळ्या प्राकृत भाषा जन्मास आल्या. डॉ. गुणे यांच्या मते हाच प्रकार पुन्हा होऊन इ. स. च्या प्रारंभापासून इ. स. ३०० पर्यंतच्या काळात अपभ्रंश भाषा निर्माण झाल्या. त्या सुमारास पल्लव, गोपाळ, शक, अहीर वगैरे अन्य भाषेचे, अन्य धर्माचे व मानव वंशाचे लोक पंजाबमार्ग हिंदुस्थानात शिरले व हीन संस्कृतीमुळे आमच्यात मिसळून जाऊन आमच्या प्राकृत भाषा बोलू लागले, तेव्हा निरनिराळ्या अपभ्रंश भाषा उत्पन्न झाल्या. पुढे दहाव्या शतकाच्या सुमारास असाच भिन्न वंश संघर्ष पुन्हा घडून सध्याच्या हिंदी, बंगाली इत्यादी आर्यभाषा जन्माला आल्या व त्याच रीतीने महाराष्ट्र अपभ्रंशापासून मराठी उत्पन्न झाली.

प्राकृत हीच महाराष्ट्री
 डॉ. ए. एम्. घाटगे - डेक्कन कॉलेज, पुणे-यांनी आपल्या 'महाराष्ट्र : लँगवेज अँड लिटरेचर' या लेखात महाराष्ट्र हेच महाराष्ट्रीचे जन्मस्थान, या मताला पुष्टी दिली आहे (जर्नल ऑफ दि युनिव्हर्सिटी ऑफ बाँबे, व्हॉ. ४, विभाग ६, मे १९३६ ). वररुची, हेमचंद्र इ. प्राकृत व्याकरणकार महाराष्ट्री, शौरसेनी, महाराष्ट्री प्राकृताला फार महत्त्व देतात. वररुचीने महाराष्ट्री, शौरसेनी, मागधी व पैशाची या चार प्राकृत भाषांचे व्याकरण लिहिले आहे. त्यात प्रथम महाराष्ट्रीचे व्याकरण ९ अध्यायांत सविस्तर देऊन पुढे एकेका अध्यायात इतर भाषांचे व्याकरण तो देतो. या पुढील अध्यायात त्या भाषांचे काही विशेष नियम देऊन ' शेषं महाराष्ट्रीवत्'- 'बाकीचे नियम महाराष्ट्रीसारखे' असा हवाला तो देतो. हेमचंद्रही 'शेषं प्राकृवत्' असाच निर्वाळा देतो. शौरसेन्यादी भाषांचा उल्लेख त्यांच्या त्यांच्या नावाने करून महाराष्ट्रीला नुसते प्राकृत म्हणण्याची चाल मागल्या काळी होती. प्राकृत हा कधी, चारही भाषा, अशा सामान्य अर्थाने योजीत तर कधी केवळ महाराष्ट्राचा निर्देश त्याने करीत. यावरून त्या भाषेचे महत्त्व किती होते ते कळून येईल.
 पण महाराष्ट्रीचा नुसता असा 'प्राकृत' म्हणून उल्लेख केल्यामुळेच मतभेदाला जागा निर्माण होऊन महाराष्ट्री व महाराष्ट्र यांच्या अविभाज्य संबंधाविषयी व महाराष्ट्रीच्या महत्त्वाविषयी निरनिराळी मते वर मांडण्यात येऊ लागली. श्री. घोष यांच्या मते वररुचीच्या पहिल्या नऊ अध्यायांत महाराष्ट्रीचे व्याकरण नसून शौरसेनीचे आहे. डॉ. घाटगे यांनी या आक्षेपाला आपल्या लेखात सप्रमाण उत्तर दिले आहे व निष्पक्ष दृष्टीने पाहता, 'महाराष्ट्रीचे माहेर महाराष्ट्र होय हे मान्य करावे लागते' असे म्हटले आहे.
 महाराष्ट्री ही महाराष्ट्राचीच या मतावर आणखी एक आक्षेप घेण्यात येतो. तो असा : प्राचीन काळी भारतातील सर्व प्रांतांतील नाटकांत स्त्रियांच्या तोंडी महाराष्ट्री भाषा घालण्याची पद्धत होती. त्याचप्रमाणे महाराष्ट्राखेरीज इतर अनेक प्रांतांत महाराष्ट्री रूढ असल्याचे पुरावेही मिळतात. त्यामुळे ती भाषा फक्त महाराष्ट्री होती असे दिसत नाही. पण या आक्षेपात अर्थ नाही. सातवाहनाचे साम्राज्य एकदोन शतके भारतातील अनेक प्रांतांवर होते. त्यांची भाषा महाराष्ट्री होती. हे आता निर्विवाद सिद्ध झाले आहे. तेव्हा मराठ्यांच्या साम्राज्यकाळी ज्याप्रमाणे मराठी भाषा तंजावर, बंगलोर, ग्वाल्हेर, उज्जयनी, इंदोर इ. प्रांतांत पसरली त्याचप्रमाणे सातवाहनाच्या साम्राज्यकाळी त्यांची महाराष्ट्री साम्राज्यातील देशात पसरली असणे पूर्ण शक्य आहे. शिवाय महाराष्ट्री भाषा सौंदर्य, सौकुमार्य, मधुरता या गुणांमुळे सर्वत्र विख्यात झाली होती. व्याकरणकारांनी, कवींनी तिचे महत्त्व गायिले होते. त्यामुळे ती स्त्रियांच्या तोंडी घालावी असे नाटककारांना वाटणे साहजिक आहे. सर्व द्रविड देशांत १८५६ पर्यंत तालुक्याचे दफ्तर मराठीत असे. सर्व वरिष्ठ महसूल अधिकाऱ्यांना मराठी लेखनवाचन येणे तोपर्यंत अवश्य होते. हा विचार या संदर्भात ध्यानात ठेवावा ( प्रा. श्रीनिवासाचारी, अन्नमलाई विद्यापीठ, डॉ. देवदत्त भांडारकर कमे. व्हॉल्यूम पृ. ४० ).
 महाराष्ट्री भाषा सर्व भारतभर प्रसृत होण्याचे आणखी एक कारण आहे. इ. पू. तिसऱ्या शतकात मगधप्रांती फार मोठा दुष्काळ पडला होता. त्या वेळी भद्रबाहूच्या नेतृत्वाखाली हजारो जैन लोक महाराष्ट्रात येऊन राहिले. दीर्घ काळ येथे राहिल्याने यांनी येथल्या महाराष्ट्री भाषेतच ग्रंथरचना केली. जैनांचे बहुतेक सर्व कथावाङ्मय हे महाराष्ट्री भाषेतच आहे. तिला जैन महाराष्ट्री म्हणतात. पण ती महाराष्ट्रीच होय असे हर्मन जाकोबीसारख्या पंडितांनी म्हटले आहे. जैन धर्म सर्व भारतात पसरला आहे. तेव्हा महानुभवांच्या धर्मप्रसारामुळे ज्याप्रमाणे मराठीचा प्रसार महाराष्ट्राबाहेर पंजाब, काबूलपर्यंत झाला त्याचप्रमाणे जैनांच्या धर्मग्रंथांमुळे महाराष्ट्रीचा सर्व भारतात प्रसार झाला हे उघड आहे.

प्राकृत शिलालेख
 महाराष्ट्री ही महाराष्ट्राचीच भाषा होय हे सिद्ध करण्यासाठी केवळ पंडितांच्या भाषाशास्त्रीय पुराव्यावरच अवलंबून राहण्याचे कारण नाही. सातवाहन वंशाचे राज्य महाराष्ट्रावर इ. पू. २५० पासून इ. पू. दुसऱ्या शतकापर्यंत होते. आणि या सातवाहनांचे नाणेघाट, कारला, कान्हेरी, नाशिक येथील सर्व शिलालेख महाराष्ट्रीत आहेत. या लेखांतून सातवाहनांच्या पराक्रमाचे वर्णन महाराष्ट्रीत - प्राकृतात केलेले आहे. गौतमीपुत्र सातकर्णी हा 'सकयवनपल्हव निसूदन' होता, 'खखरातवस निखसेसकर' होता असे त्याचे वैभव प्राकृतात गायिले आहे. त्याची माता गौतमी बलश्री हिचेही वर्णन असेच आहे.

सत्तसई
 यापेक्षाही बलवत्तर व निःसंदेह पुरावा म्हणजे हाल सातवाहन या राजाने रचलेला गाथा सत्तसई – सप्तशती - हा ग्रंथ होय. हा ग्रंथ म्हणजे सुभाषितांचा कोश आहे. आणि हाल राजाने अनेक ग्रंथांतून व लोकांच्या पाठांतून ही सुभाषिते, या गाथा, संग्रहीत केल्या आहेत. अनेक ग्रंथांतून या गाथा वेचल्या याचा अर्थच हा की यापूर्वी महाराष्ट्री भाषेत अनेक ग्रंथ झाले असले पाहिजेत. आणि लोकांच्या पाठांतून या गाथा वेचल्या, यावरून महाराष्ट्री ही त्या वेळी लोकभाषा होती हे उघड आहे. महाराष्ट्री भाषेतील या सत्तसईमध्ये गोदावरी, सह्याद्री यांचा अनेकवार उल्लेख येतो. त्यामुळे तिची रचना महाराष्ट्रात झाली व ते त्या काळच्या महाराष्ट्रजीवनाचे वर्णन आहे यात शंका नाही. वर निर्देशिलेले शिलालेख इ. पू. दुसऱ्या, पहिल्या शतकातले आहेत. तर सत्तसईची रचना इ. स. पहिल्या शतकातली आहे. यावरून इ. पू. ३ ऱ्या ४ थ्या शतकापासून महाराष्ट्री ही महाराष्ट्राची लोकभाषा होती हे निःसंशय दिसते. वरुचीचा काळ इ. स. पू. १ ले २ रे शतक असा मानला जातो. त्या काळी त्याने प्राकृत भाषांचे व्याकरण लिहिले व त्यात महाराष्ट्रीला प्राधान्य दिले. व्याकरण लिहून त्यात या भाषेचा गौरव करावा अशी संपन्नता महाराष्ट्रीला त्या वेळी प्राप्त झाली होती, असे यावरून निश्चित दिसते. तेव्हा त्याच्या आधी दोन एक शतके तरी या भाषेची उत्पत्ती झाली असली पाहिजे, हे मान्य केले पाहिजे. अशा रीतीने महाराष्ट्री ही महाराष्ट्राची भाषा होती व ती इ. पू. ४ थ्या ५ व्या शतकापर्यंत मागे जाते याविषयी शंका राहात नाही. 'प्राकृत शब्दमहार्णव' या कोशाचे कर्ते पं. हरगोविंददास शेठ यांनी या कोशाच्या प्रस्तावनेत महाराष्ट्री प्राकृत महाराष्ट्रातच निर्माण झाली, ती अशोक पूर्वकाळात रूढ होती व पुढे त्या महाराष्ट्रीच्या अपभ्रंशापासूनच मराठी झाली असे मत दिले आहे (पृ. ३८-४६ ).
 आर. पिशेल हा जर्मन पंडित होय. त्याने भारतातील प्राकृत भाषांचा अभ्यास करून ' ए कंपॅरेटिव्ह ग्रामर ऑफ दि प्राकृत लंगवेजेस' हा ग्रंथ लिहिला आहे. वर आतापर्यंत जे महाराष्ट्रीसंबंधी विवेचन केले आहे त्याचा समारोप त्याच्या वरील ग्रंथातील अवतरणांवरून उत्तम होईल असे वाटते म्हणून ती जुळवून येथे देतो. जेव्हा भारतीय पंडित 'प्राकृत' हा शब्द वापरतात तेव्हा सर्वसाधारणपणे महाराष्ट्री हीच त्यांना अभिप्रेत असते. मराठ्यांची भूमी जी महाराष्ट्र तिच्यावरूनच महाराष्ट्री हे त्यांच्या भाषेला नाव पडले आहे. अशा रीतीने महाराष्ट्रीचा मराठीशी दृढ संबंध आहे यात संदेह नाही. पुढे पुढे कवींनी आपल्या काव्यात महाराष्ट्रीला फार कृत्रिम रूप दिले. पण गाथासत्तसईचे तसे नाही. या सत्तसईवरून हे स्पष्ट होते की त्या ग्रंथापूर्वी प्राकृत साहित्य अतिशय समृद्ध होते ( पिशेलच्या व्याकरण ग्रंथाचे सुभद्र झा यांनी केलेले इंग्रजी भाषांतर. प्रकाशक, मोतीलाल बनारसीदास, दिल्ली (१९२७) पृ. १ ते १४ ).
 या गाथासत्तसईच्या आधारेच अकराव्या शतकातील राजा भोज याने आपल्या 'सरस्वती कण्ठाभरण' ग्रंथात म्हटले आहे की हाल सातवाहन राजाच्या राज्यात प्राकृत जाणीत नाही असा एकही माणूस नव्हता.
 सातवाहनांच्या नंतर महाराष्ट्रात वाकाटक घराण्याचे साम्राज्य होते. इ. स. २५० ते ५५० पर्यंत वाकाटकांनी राज्य केले. प्रारंभी यांचे राज्य विदर्भात होते. पण पुढे ते नर्मदेपासून तुंगभद्रेपर्यंत पसरले होते. वाकाटक राजे प्राकृताचे अभिमानी होते, एवढेच नव्हे, तर त्या घराण्यांतील राजांनी महाराष्ट्री प्राकृतात स्वतः काव्यरचनाही केली आहे. राजा दुसरा प्रवरसेन याने 'सेतुबंध' किंवा 'रावणवहो' हे काव्य रचले आणि राजा सर्वसेन याने 'हरिविजय' हे काव्य रचले.
 वरील प्रमाणांवरून इ. पू. ५०० । ६०० पासून इ. स. ५०० । ६०० पर्यंत महाराष्ट्रात महाराष्ट्री प्राकृत भाषा प्रचलित होती, राज्यकर्त्यांना व लोकांना तिचा अभिमान होता आणि त्या भाषेत या भूमीमध्ये ग्रंथरचनाही होत असे, यांविषयी शंका घेण्यास जागा राहणार नाही. एखाद्या समाजाची व देशाची पृथगात्मता सिद्ध होण्यास एवढी प्रमाणे पुरेशी आहेत.
 संस्कृतातील सुप्रसिद्ध कवी दण्डी हा ७ व्या शतकात होऊन गेला. त्याने या विचारावर आपल्या ' काव्यादर्श' या ग्रंथात शिक्कामोर्तबही करून टाकले आहे. त्याचे पुढील वचन सुप्रसिद्ध आहे.
  महाराष्ट्राश्रयां भाषां प्रकृष्टं प्राकृतं विदुः ।
  सागरः सूक्तिरत्नानां सेतुबंधादि यन्मयम् ॥
 महाराष्ट्रात प्रचलित असलेली भाषा ही पंडितांच्या मते सर्वात श्रेष्ठ प्राकृत भाष होय. कारण त्या भाषेत सेतुबंधासारखे सूक्तिरत्नांचे सागरच्या सागर आहेत. 'सेतुबंध ' हे महाराष्ट्रीतील सुप्रसिद्ध काव्य होते हे वर सांगितलेच आहे. तेव्हा महाराष्ट्राची महाराष्ट्री ही भाषा असून ती अत्यंत संपन्न होती असा दण्डी कवीचाही अभिप्राय होता असे दिसते.

अपभ्रंशापासून मराठी
 वर जिचे वर्णन केले त्या महाराष्ट्रीपासूनच मराठीची उत्पत्ती झाली असे मत बरेच दिवस रूढ होते. आजही डॉ. ए. एम. घाटगे यांच्यासारख्या पंडिताचे तेच मत आहे. डॉ. भांडारकर, स्टेन कोनौ, ग्रियरसन या जुन्या पंडितांचे निश्चितच होते. पण अलीकडे सुमारे चाळीसपन्नास वर्षापूर्वी अपभ्रंश साहित्याचा शोध लागल्यामुळे या मतात जरा बदल झाला आहे. तो असा की महाराष्ट्रीपासूनच मराठीची उत्पत्ती झाली हे जरी खरे असले तरी ती मराठीची साक्षात माता नसून मातामही होय. महाराष्ट्री प्राकृतापासून 'महाराष्ट्री अपभ्रंश ' ही भाषा निर्माण झाली व तिच्यापासून मराठीची उत्पत्ती झाली असे नवे मत आहे. कुलगुरू चिंतामणराव वैद्य, डॉ. पां. दा. गुणे, डॉ. शं. गो. तुळपुळे, डॉ. वि. भि. कोलते यांनी या मताचा पुरस्कार केला आहे. या पंडितांनी आपल्या मताच्या सिद्धयर्थ जो भरभक्कम पुरावा उभा केला आहे त्याकडे पाहता, हेच मत सर्वमान्य होईल असे वाटते.
 येथे 'अपभ्रंश' हा शब्द वापरला आहे तो महाराष्ट्रात महाराष्ट्री-प्राकृत या भाषेपासून उद्भवलेली मराठीची पूर्वगामी अशी एक स्वतंत्र भाषा या अर्थाने वापरला आहे, हे ध्यानात ठेविले पाहिजे. कारण जुन्या काळी त्याला याहून इतर अनेक अर्थ होते. संस्कृतापासून झालेली कोणतीही विकृती ही पतंजलीच्या मते अपभ्रंश होय. दण्डीने तोच अभिप्राय दिला आहे. तो म्हणतो, आभीरादी लोकांच्या भाषेला काव्यात अपभ्रंश म्हणतात; पण शास्त्रात मात्र संस्कृतापासून भिन्न ते सर्व अपभ्रंश होत. भामहाच्या मते संस्कृत व प्राकृत यांहून अपभ्रंश निराळी आहे. संस्कृत, प्राकृत, मागधी, शौरसेनी, पैशाची व अपभ्रंश अशा सहा भाषा आहेत असे चंड, रुद्रट, हेमचंद्र यांचे मत आहे. त्यात रुद्रटाच्या मते अपभ्रंशाचे देशपरत्वे अनेक प्रकार आहेत. रुद्रटाने अपभ्रंश हा शब्द सामान्य अर्थी वापरला आहे; आणि सध्याच्या पंडितांना तो मान्य आहे. म्हणून विवक्षित देशातील भाषेचा उल्लेख करताना ते शौरसेनी अपभ्रंश, मागधी अपभ्रंश, महाराष्ट्री अपभ्रंश असा निर्देश करतात. येथील विवेचनात शेवटचा अर्थ अभिप्रेत आहे हे वर सांगितलेच आहे.
 आभीरादींच्या भाषांना अपभ्रंश म्हणतात असे दण्डी म्हणतो. डॉ. पां. दा. गुणे यांचे, शक, पल्लव, आभीर इ. रानटी टोळ्या इ. सनाच्या प्रारंभी भारतात आल्या व त्या आर्यसमाजात मिसळून गेल्यामुळे येथल्या मूळच्या भाषा व त्यांच्या भाषा यांचे मिश्रण होऊन येथे निरनिराळ्या अपभ्रंश भाषा निर्माण झाल्या असे मत असल्याचे वर सांगितलेच आहे. अपभ्रंश भाषांची ही उत्पत्ती त्यांच्या मते इ. सनाच्या ४ थ्या शतकात झाली. 'भविसयत्तकहा' या धनपालाच्या अपभ्रंश ग्रंथाला त्यांनी जी प्रस्तावना जोडली आहे तिच्यात अपभ्रंश भाषांचा त्यांनी सविस्तर विचार केला आहे. आणि विविधज्ञानविस्तारातील लेखातले मत तेथे मांडले आहे. याच लेखात त्यांनी 'महाराष्ट्री अपभ्रंश ' ही मराठीची प्रत्यक्ष जननी होय असे मत मांडून अपभ्रंशापासून मराठीने कोणते विशेष उचलले ते सविस्तर सांगून भरपूर प्रमाणांनी आपले मत सिद्ध केले आहे. त्यांतील काही महत्त्वाची प्रमाणे पुढे देतो. १. भूतकाळ- वाचकरूपे भूतकालवाचक धातुसाधितांवरून करण्याचा प्रघात. २. विध्यर्थाची रूपे कर्मणिधातुसाधितांवरून करण्याची चाल. ३. क्रियातिपत्ती हा 'ल'कारही वर्तमानकालवाचक धातुसाधितांवरून साधण्याची पद्धत. ४. वर्तमानकालवाचक धातुसाधित भूतकाल दर्शविण्यासाठी वापरण्याची रीत - हे सर्व मराठीने अपभ्रंशापासून घेतले आहे. ( विविधज्ञानविस्तार – जून १९२२ - वर्ष ५३ ) त्याचप्रमाणे १. प्रथमाविभक्ती - एक- वचनी उ, ओ प्रत्यय लावणे अगर उभयवचनी व द्वितीयेतही तो गाळणे, हा प्रकार, २. ( षष्ठी विभक्ती विशेषणरूप बनवून तिला तद्धित प्रत्यय जोडण्याचा प्रकार व ३. इतर काही विभक्ती नवे प्रत्यय लावून बनविण्याचा प्रकार - (तृतीया व पंचमी), हे सर्व प्रकार मराठीने अपभ्रंशातून स्वीकारले आहेत.
 संकृतावरून महाराष्ट्री प्राकृत, तिच्यापासूनच महाराष्ट्री अपभ्रंश आणि या अपभ्रंशा- पासून मराठी - ही परंपरा अशा रीतीने निर्विवाद सिद्ध होते असे दिसून येईल.

जैन महाकवी पुष्पदन्त
 महाराष्ट्री अपभ्रंश ही भाषा चौथ्या शतकाच्या आरंभी उत्पन्न झाली असली तरी तिला विकसित होऊन ती वाङ्मययोग्य होण्यास ४/५ शे वर्षे लागली असे दिसते. 'महापुराण', जसहरचरिऊ ', 'णायकुमारचरिऊ', हे पुष्पदंताचे ग्रंथ व 'भविसयत्तकडा', 'करकंडचरिऊ', 'पऊमचरिऊ', 'सावयधम्मदाहो' इ. आज उपलब्ध असलेले सर्व अपभ्रंश ग्रंथ हे दहाव्या अकराव्या शतकातील आहेत. पुष्पदन्त हा अपभ्रंश-साहित्यातील सर्वश्रेष्ठ कवी मानला जातो. हा कवी महाराष्ट्रातील मान्यखेटचा राष्ट्रकूट राजा कृष्ण याचा अमात्य भरत याच्या आश्रयाला होता. भरताच्या मृत्यूनंतर त्याचा पुत्र नन्न याने याला आश्रय दिला. पुष्पदन्त प्रथम शैव असून पुढे त्याने जैन धर्माचा आश्रय केला. त्याने वरील तीनही ग्रंथ जैन झाल्यानंतर लिहिलेले आहेत. पण शेवटपर्यंत तो महाराष्ट्रातच होता यात वाद नाही.


राजशेखर
 काव्यमीमांसाकार राजशेखर हा सुप्रसिद्ध कवी दहाव्या शतकात होऊन गेला. तो महाराष्ट्रीय असावा असा पंडितांचा तर्क आहे. त्याला महाराष्ट्राचा मोठा अभिमान होता हे निश्चित. आपला पणजा अकालजलद त्याचा त्याने महाराष्ट्र - चूडामणी असा उल्लेख केला आहे ( बाल रामायण १.३० ). काव्यमीमांसेत राजशेखराने कविराजांची काव्यपरीक्षेची सभा कशी असावी याचे वर्णन केले आहे. त्यावरून त्या वेळी अपभ्रंश भाषेचे स्थान काय होते ते कळून येते. या सभेत उत्तरेला संस्कृत कवी, पूर्वेला प्राकृत कवी आणि पश्चिमेला अपभ्रंश कवी बसावे असे सांगून राजशेखराने या भिन्न भाषिक कवींच्या मागे कोणी बसावे सांगितले आहे. तो म्हणतो, संस्कृत कवींच्या मागे पंडित असावे, प्राकृत कवींच्या मागे नर्तक, नट, गवई असावे आणि अपभ्रंश कवींच्या मागे मात्र वणिग्वरी, सोनार, लोहार, सुतार व त्यांसारखे इतर असावे. यावरून सामान्यजनांची बोली अपभ्रंश ही असून तिच्यात वाङ्मय निर्माण होत असावे असे डॉ. गुणे यांनी अनुमान केले आहे, ते सयुक्तिक वाटते.

पुष्पदन्त - मराठी कवी
 महापुराण, जसहरचरिऊ व णायकुमारचरिऊ या काव्यत्रयीचा कर्ता अपभ्रंश महाकवी पुष्पदन्त याचा वर उल्लेख आलाच आहे. 'राष्ट्रकूटकालीन मराठी' या आपल्या लेखात श्री. ग. वा. तगारे यांनी वरील ग्रंथांच्या भाषेतील वर्णप्रक्रिया, प्रत्ययप्रक्रिया व वाक्यरचना यांची चिकित्सा करून 'ही भाषा म्हणजे ज्ञानेश्वर- पूर्वकालीन मराठीच होय ' व ' पुष्पदन्त मराठीचाच कवी होता', असे मत मांडले आहे. ( महाराष्ट्र साहित्यपत्रिका, वर्ष १४, अंक १ ला . ) हे मत सर्वमान्य झाले नाही. पण श्री. प. ल. वैद्यसंपादित 'महापुराणा'ला नाथूराम प्रेमी यांनी जे प्रास्ताविक जोडले आहे त्यात या मताचा आवर्जून उल्लेख केला आहे. याशिवाय नाथूराम यांनी अशीही माहिती दिली आहे की पुष्पदन्ताचे एक नाव खंड असे होते; आणि महाराष्ट्रात खंडूजी, खंडोबा ही नावे प्रचलित आहेतच ( प्रास्ताविक पृ. ६ ). पुष्पदन्त मूळचा महाराष्ट्रीय नव्हे. पण प्रौढपणी महाराष्ट्रीय झाल्यावर त्याने हे नाव स्वीकारले असावे.
 श्री. तगारे यांनी आपल्या सिद्धान्ताला पुढीलप्रमाणे पुरावे दिले आहेत. ते म्हणतात, पुष्पदन्ताचे लिखाण ज्ञानेश्वरपूर्वकालीन मराठीत आहे याला पुढील प्रमाणे देता येतील - ( १ ) ते वाङ्मय महाराष्ट्राची प्राचीन राजधानी मान्यखेट येथे लिहिले गेले आहे. आज निर्विवाद तऱ्हेने मराठी समजले जाणारे बरेच प्राचीन वाङ्मय मान्यखेटच्या जवळपास निर्माण झाले आहे. (२) ते वाङ्मय बहुजनसमाजाला कळून धर्मप्रसार व्हावा या उद्देशाने मान्यखेटच्या देशभाषेत लिहिले आहे. (३) ज्ञानेश्वर कालीन मराठीत ( व आजसुद्धा ) प्रचलित असलेले अनेक शब्द त्यात आढळतात. ( ४ ) वर्णप्रक्रिया, प्रत्ययप्रक्रिया, वाक्यरचना इ. भाषाशास्त्रीय पुराव्यावरून त्याची भाषा म्हणजे ज्ञानेश्वरपूर्व मराठीचे रूप आहे असे ठरते. (५) त्यातील वृत्त व मराठीतील वृत्ते ( गणवृते, मात्रावृते व आधुनिक गेयवृत्तेसुद्धा ) एकच आहेत.

देसी भासा
 प्राचार्य वि. भि. कोलते यांनी आपल्या 'मराठीचे माहेर' या लेखात 'अपभ्रंशा- पासूनच साक्षात मराठी निर्माण झाली ', हे मत अनेक प्रमाणे देऊन मांडले आहे ( विक्रमस्मृती १९४६ - ग्वाल्हेर ) 'मराठी भाषा उद्गम व विकास' या आपल्या ग्रंथात प्रा. कृ. पां. कुलकर्णी यांनी 'मराठी अमुक एका विशिष्ट भाषेपासून निघाली असे म्हणता येत नाही' असे मत मांडले आहे. संस्कृत, महाराष्ट्री, अर्धमागधी इ. सर्व प्राकृत व अपभ्रंश यांचे सर्वांचे काही विशेष मराठीत दिसतात म्हणून अमुकच एक भाषा मराठीची जननी असे म्हणणे सयुक्तिक नाही, असे श्री. कुळकणीं म्हणतात. प्रा. कुळकर्णी याची या बाबतीतली सर्व विधाने खोडून काढून प्रा. कोलते यांनी 'अपभ्रंश' हीच मराठीची जननी हे आपले मत सिद्ध केले आहे. प्रा. कुळकर्णी यांची काही विधाने व त्याला प्रा. कोलते यांनी दिलेली उत्तरे खाली दिली आहेत, त्यांवरून श्री. कोलते यांचा सिद्धांत स्पष्ट होईल.
 प्रा. कुळकर्णी म्हणतात, 'तृण, प्रावृष, वृक्ष इ. संस्कृत शब्दांची वर्णप्रक्रियेमुळे झालेली तिण, पाऊस, रुख ही व या प्रकारची रूपे पालीमध्ये आढळतात व तीच मराठीमध्ये आढळतात.' यावर श्री. कोलते यांचे उत्तर असे की, ' ही रूपे अपभ्रंश भाषेतही आढळतात. 'णायकुमारचरिऊ', 'करकंडचरिऊ' इ. अपभ्रंश ग्रंथात ही रूपे आहेत. शिवाय प्राकृत, अपभ्रंश या भाषांच्या अपेक्षेने पालीभाषा एकतर अत्यंत प्राचीन होय. आणि दुसरे म्हणजे ती उत्तर हिंदुस्थानच्या पूर्व भागात रूढ होती. त्यामुळे मराठीशी तिचा साक्षात संबंध येणे असंभवनीय आहे.'
 पैशाचीखेरीज इतर प्राकृत भाषांत 'न 'कार नाही, तेव्हा तो मराठीने पैशाचीतून घेतला आहे, हे श्री. कुळकर्णी यांचे मतही असेच चुकीचे आहे. महाराष्ट्री प्राकृतात 'न' आहे (पहा - गौडवहो ) आणि तो अपभ्रंशातही आहे ( णायकुमार चरित-प्रस्तावना - डॉ. हिरालाल जैन ). तेव्हा तो पैशाचीवरून घेण्याची मराठीला गरज नव्हती, हे उघड आहे. अर्धमागधीमध्ये दीर्घस्वर ऱ्हस्व होणे, 'द' चा 'उ' होणे, आद्य 'न' जसाच्या तसा राहणे, मृदू व्यंजनाचे कठोर व्यंजन होणे, इ. लकबा आहेत; आणि तशाच त्या मराठीत आहेत हे खरे; पण त्या अपभ्रंशातही सापडतात. तेव्हा ते अर्धमागधीचे ऋण असे मानण्याचे कारण नाही. या सर्व प्रमाणांवरून मराठीचे जननीत्व अनेक भाषांकडे देणे अयुक्त आहे व अपभ्रंशाशीच तिचा साक्षात संबंध आहे हे डॉ. कोलते यांचे मत मान्य होईल असे वाटते.
 मराठीचे जननीत्व अपभ्रंश भाषेकडेच आहे असे सिद्ध करण्यास डॉ. कोलते यांनी आणखी एक सबळ पुरावा दिला आहे. तो म्हणजे मराठी भाषेच्या नावाचा. ज्ञानेश्वरकालीन वाङ्मयात काही वेळा मऱ्हाटा हा शब्द सोपा, साधा, या अर्थी येतो व तसाच तो मराठी भाषा या अर्थीही येतो. यावरून मऱ्हाटी या शब्दाला केवळ भाषावाचक अर्थ त्या वेळी आलेला नव्हता. तो हळूहळू येत होता असे दिसते. या तर्काला पुष्टी देणारा दुसरा पुरावा असा की पुष्कळ वेळा तत्कालीन ग्रंथांत मराठीचा 'देशी' अथवा 'देशी भाषा' असा उल्लेख केलेला आढळतो. ज्ञानेश्वरी, उद्धवगीता, रुक्मिणी स्वयंवर ( नरेन्द्र ) या काव्यांत याची विपुल उदाहरणे आढळतात. आता मराठीचे 'देशी' हे नाव फार सूचक आहे. कारण अपभ्रंश भाषेला तिच्या कवींनी 'देशी' असेच नाव दिले आहे. शास्त्रीय ग्रंथांत तिला अपभ्रंश हे नाव रूढ असले तरी कवी बहुधा तिचा 'देसी भासा ', 'देसभास', ' देसिल' असा उल्लेख करतात. तेव्हा ज्ञानेश्वर, भास्कर, नरेंद्र इ. प्राचीन मराठी कवी अपभ्रंशाचेच विकसित रूप वापरीत होते, आणि ते अगदी सहजक्रमाने घडत होते, असे म्हणण्यास प्रत्यवाय नाही. याच संबंधात आणखीही एक उपोद्बलक असा पुरावा सापडतो. अपभ्रंशाचे नागर, उपनागर व व्राचड असे तीन प्रमुख प्रकार मार्कंडेय या व्याकरणकाराने दिले आहेत. त्यांतील नागर अपभ्रंशापासून मराठीचा जन्म झाला असे म्हणता येईल. कारण आपली भाषा म्हणजे 'नागर बोल' आहेत असाही उल्लेख ज्ञानेश्वरी, वच्छहरण इ. ग्रंथांत कवींनी केला आहे. 'देशी' व 'नागर' अशी दोन नावे अपभ्रंश भाषेची त्या काळी रूढ होती. तीच नावे प्राचीन मराठी कवींनी मराठीला योजलेली आहेत. तेव्हा अपभ्रंश भाषेपासूनच मराठीचा जन्म झाला असे म्हणणेच जास्त सयुक्तिक आहे.

उत्क्रांत अपभ्रंश मराठी
 

यासंबंधी अखेरचे निर्णायक व निःसंदिग्ध असे मत डॉ. शं. गो. तुळपुळे यांनी आपल्या 'यादवकालीन मराठी भाषा' या प्रबंधात दिले आहे. यादवकालीन मराठी हे मराठीचे प्रारंभीचे रूप होय. ती भाषा जर महाराष्ट्री अपभ्रंशापासून उत्पन्न झाली असे सिद्ध झाले तर संस्कृत, महाराष्ट्री, अपभ्रंश व मराठी अशी साखळी जोडली जाऊन महाराष्ट्राची पृथगात्मता इ. पू. तिसऱ्या चौथ्या शतकापासून निश्चित सिद्ध होते असे म्हणता येईल. डॉ. तुळपुळे यांनी हे महत्त्वाचे कार्य आपल्या प्रबंधात केले आहे. त्यांनी केलेले विवेचन साररूपाने पुढे देतो.
 " मराठी ही अनेक भाषांपासून निघाली असा सिद्धान्त कित्येक प्रतिपादितात; तसे नसून ती अपभ्रंशापासून निघाली हे माझे मुख्य म्हणणे आहे. यादव मराठीची वर्णप्रक्रिया व प्रत्ययप्रक्रिया या अपभ्रंश भाषेतून उत्क्रान्त झालेल्या दिसतात. म्हणजेच यादव मराठी ही अपभ्रंशापासून उत्पन्न झाली. मराठीतील काही बाबी अपभ्रंशात न आढळता महाराष्ट्रीत व काही थोड्या मागधी - शौरसेनीत आढळतात. तेवढ्यापुरते मराठीने अपभ्रंशाला सोडले असले तरी मुख्यतः अपभ्रंशाचाच सांगाडा जशाचा तसा मराठीत उतरला हे निश्चित. " ( यादवकालीन मराठी भाषा - पृ. १९ )
 या अपभ्रंश भाषेची पूर्वपीठिका सांगताना डॉ. तुळपुळे म्हणतात : आर्यलोक विध्याच्या दक्षिणेस इ. पू. ६०० च्या सुमारास येऊ लागले व त्यांनी गोपराष्ट्र महराष्ट्र, पांडुराष्ट्र, कोकण, विदर्भ व अदमक ही मुख्य राष्ट्र स्थापित केली. या सर्वांचे मिळून पुढे मोठे राष्ट्र झाले तेच महाराष्ट्र या महाराष्ट्रात आर्य जी भाषा तत्काली बोलत ती महाराष्ट्री प्राकृत. याचा अर्थ असा की इ. स. पूर्वी ६०० च्या मुमाराम महाराष्ट्राचे स्वतंत्र अस्तित्व होते है निश्चित. येथील महारटी लोक त्या वेळी जी महाराष्ट्री भाषा बोलत ती संस्कृतची उ उ अपभ्रष्ट प्रतिकृती होती. या महाराष्ट्रीचाच अपभ्रंश महाराष्ट्रात इ. स. ५०० च्या सुमारास रूढ झाला; आणि या महाराष्ट्री अपभ्रंशापासूनच इ. स. १००० च्या सुमारास मराठी उत्पन्न झाली ( यादव. पृ. २४).
 याप्रमाणे मुख्य सिद्धान्ताचे प्रतिपादन करून नंतर डॉ. तुळपुळे यांनी वर्णप्रक्रिया- प्रत्ययप्रक्रिया, शब्दसिद्धी व वाक्प्रयोग या दृष्टींनी महाराष्ट्री अपभ्रंशापासून यादव- कालीन मराठी उत्पन्न झाली व उत्कान्त झाली हे निःसंदेह रीतीने सिद्ध केले आहे. ते म्हणतात, "(१) मराठीची वर्णप्रक्रिया अपभ्रंशापासूनच झालेली असून अपभ्रंशातील सर्व उच्चार तीत आढळतात. यादव मराठीतील उच्चारप्रक्रिया म्हणजे अपभ्रंशातील उच्चारपद्धतीचीच उत्क्रांत अवस्था होय. अपभ्रंशातील स्वर व व्यंजने यादव मराठीत उतरली आहेत. अपभ्रंशातील च, छ, ज, झ यांचे दंततालव्य उच्चार यादव मराठीत आले. एतत् प्रकरणी स्थाननियत स्वरप्रक्रिया, अंत्यस्वरांचे ऱ्हस्वीकरण, स्वरभक्तीचे प्राबल्य इ. १९ बाबी यादव मराठीने साक्षात अपभ्रंशापासून घेतल्या आहेत. तात्पर्य, यादव मराठीतील उच्चार अपभ्रंशातून वर्णप्रक्रियेच्या नियमांनी उतरले आहेत. ( २ ) प्रत्ययत्रक्रिया - यातील नामविभक्तीप्रकरणावरून पुढील सिद्धांत बांधता येईल. यादव मराठीत विभक्तीची प्रत्ययी व सामासिक अशी दोन्ही रूपे जोडीने आढळतात. अपभ्रंशातील प्रत्ययी विभक्ती आणि वर्तमानमराठीतील सामासिक विभक्ती यांमधील हा एक सांधणारा दुवा आहे. आख्यात विभक्तीचा विचार करता असे दिसते की यादव मराठीने अपभ्रंशाव्यतिरिक्त कोणतेही प्रत्ययी रूप स्वतंत्रपणे बनविले नाही. अपभ्रंशातील आणि यादव मराठीतील प्रत्ययी आख्यात विभक्ती समसमान आहेत. " प्रत्ययप्रक्रियेविपयी तपशील देताना डॉ. तुळपुळे यांनी मराठीत अपभ्रंशातून नामविभक्तीच्या बाबतीत १२ लकबा आल्याचे सांगून पुढे म्हटले आहे की यादव मराठीने नामांची व सर्वनामांची प्रत्ययी विभक्तीरूपे अपभ्रंशातूनच घेतली आहेत. त्याचप्रमाणे आख्यात विभक्तीच्या बाबतीत अपभ्रंशातून यादवमराठीत आलेल्या ७ बाबींचे विवरण करून त्यांनी म्हटले आहे की यादव- मराठीने क्रियापदाची प्रत्ययी रूपे व कृदन्त रूपे साक्षात अपभ्रंशापासून घेतली. संयुक्त क्रियापदे किंवा सामासिक क्रियारूपे मात्र तिने स्वतंत्रपणे बनविली आहेत. (३) शब्दसिद्धीचे खालील प्रकार यादव मराठीने अपभ्रंशातून घेतले आहेत. बहुतेक सर्व तद्धित प्रक्रिया; पण, पें, ए, ई, इव या प्रत्ययांनी झालेली भाववाचक नामे ; ध्वन्यनुकारी शब्द; बरेचसे द्विरुक्त शब्द; नामधातू व क्रियानामे. यावरून यादव मराठीतील शब्दसिद्धीच्या ६ विशेष प्रकारांपैकी ४ प्रकार अपभ्रंशातून आलेले आहेत.
 महाराष्ट्री अपभ्रंशातून यादव मराठीत उतरलेले हे विशेष पाहिले म्हणजे एवढे स्पष्ट दिसते की यादव मराठीची उच्चारप्रक्रिया, प्रत्ययप्रक्रिया आणि शब्दसिद्धी या सर्वस्वी अपभ्रंशाच्या पुढची पायरी म्हणजे उत्क्रान्त अवस्था दर्शवितात. अपभ्रंशात नसलेल्या महाराष्ट्री प्राकृताच्या सहाच बाबी यादवमराठीत आहेत. पण तेवढ्यावरून मराठी ही साक्षात महाराष्ट्रीपासून निघाली असे म्हणता येत नाही. पैशाची मागधी यांचे काही विशेष मराठीत दिसतात. पण तेवढ्यावरून मराठीच्या त्या जननी असे म्हणता येत नाही. अपभ्रंशाची वर्णप्रक्रिया व प्रत्ययप्रक्रियाच मराठीत अवतरली असता तिचा उगम दुसरीकडे शोधण्याचे कारण नाही. एतावता यादव- मराठी ही महाराष्ट्री अपभ्रंशापासून निघाली हे स्पष्ट आहे.

अखंड पृथगात्मता
 मराठीची ही पूर्वपीठिका ध्यानी घेतली तर आज आपण जिला महाराष्ट्र म्हणतो त्या भूमीला इ. स. पूर्व चौथ्या-पाचव्या शतकापासून पृथगात्मता प्राप्त झाली होती असे दिसून येईल. महाराष्ट्री या भाषेमुळे त्या वेळी हा भूप्रदेश व येथला समाज पृथगात्म झाला होता. त्या महाराष्ट्री भाषेचाच अपभ्रंश म्हणजे महाराष्ट्री अपभ्रंश होय. ही भाषा महाराष्ट्रातच इ. सनाच्या चौथ्या पाचव्या शतकात जन्माला आली आणि तिच्यापासूनच नवव्या-दहाव्या शतकात मराठीचा जन्म झाला. म्हणजे इ. स. पूर्व पाचव्या शतकापासून पुढे या भूमीच्या पृथगात्मतेला केव्हाही खंड पडला नाही. समाजाला पृथगात्मतेची जाणीव जशी तीव्र होत जाते, तसतसे त्याचे कर्तृत्व विकसत जाते. महाराष्ट्रात हेच घडले. येथे सातवाहन घराण्यासारखे साम्राज्यकर्ते घराणे इ. पू. तिसऱ्या शतकात उदयास आले. आणि वाकाटक, चालुक्य, राष्ट्रकूट, यादव यांनी ती पराक्रमाची परंपरा दीड हजार वर्षे टिकविली. याच काळात विद्या, कला, साहित्य या संस्कृतीच्या प्रधान अंगांचाही येथे विकास झाला. हा सर्व इतिहास आता पहावयाचा आहे पण त्यापूर्वी महाराष्ट्र हे नामाभिधान कसे पडले व ही भूमी, येथला समाज व येथले साहित्य यांचा अभिमान येथे कसा विकसत गेला हे पाहणे अवश्य आहे.
 
 
 
 
 
 
 https://mr.wikisource.org/wiki/%E0%A4%AE%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%B7%E0%A5%8D%E0%A4%9F%E0%A5%8D%E0%A4%B0_%E0%A4%B8%E0%A4%82%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%95%E0%A5%83%E0%A4%A4%E0%A5%80/%E0%A4%AE%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%B7%E0%A5%8D%E0%A4%9F%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%80%E0%A4%AF_%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%9C%E0%A4%98%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%A3%E0%A5%80

स्वकीय राजसत्ता
 सातवाहनांनंतर पुढील हजार वर्षांच्या काळात महाराष्ट्रावर नंदिवर्धन व वत्सगुल्म ( नागपूर प्रांत ) येथील वाकाटक, बदामीचे चालुक्य, मान्यखेटचे राष्ट्रकूट, कल्याणीचे चालुक्य व देवगिरीचे यादव अशा पाच राजघराण्यांनी राज्य केले. इ. स. १३१८ साली दिल्लीच्या मुस्लिम सुलतानांनी यादवांची सत्ता नष्ट केली आणि महाराष्ट्राला पारतंत्र्य आले. इ. स. २३५ पासून म्हणजे सातवाहनांच्या सत्तेच्या प्रारंभापासून इ. स. १३१८ पर्यंतचा सुमारे दीडहजार वर्षांचा काल हा महाराष्ट्राच्या इतिहासाचा पहिला कालखंड होय. हा सर्व काल स्वराज्य, स्वातंत्र्य व साम्राज्य यांचा कालखंड होता. १३१८ साली या भूमीचे स्वातंत्र्य नष्ट झाले व तेथे परकी मुस्लिम सत्ता प्रस्थापित झाली. ती इ. स. १६४७ पर्यंत टिकली. तीनसवातीनशे वर्षांचा हा काळ म्हणजे आपल्या इतिहासाचा दुसरा कालखंड होय. तेथून पुढे पुन्हा स्वराज्याचा व साम्राज्याचा काळ येतो. हा वैभवाचा काळ इ. स. १८१८ मध्ये समाप्त झाला. तेथे तिसरा कालखंड संपला. तेथून १९४७ मध्ये भरतभू स्वतंत्र होईपर्यंतचा चौथा कालखंड होय. या ग्रंथात या चार कालखंडांचा पृथकपणे इतिहास द्यावयाचा आहे. हा महाराष्ट्राचा सांस्कृतिक इतिहास आहे. तेव्हा धर्म, समाजरचना, अर्थव्यवस्था, शिक्षण, विद्या, शास्त्रे, कला, साहित्य यांचाच प्रामुख्याने विचार यात होणार हे उघड आहे. पण मागे एका ठिकाणी सांगितल्याप्रमाणे, स्वकीय राजसत्ता, राजकीय स्वातंत्र्य हा सर्व संस्कृतीचा मूलाधार होय. ' शस्त्रेण रक्षिते राज्ये शास्त्रचिंता प्रवर्तते ।' शस्त्रबळाने, राजसत्तेने रक्षिलेल्या भूमीतच विद्याकलांचा विकास होऊ शकतो, हे व्यासवचन अक्षरशः खरे आहे. महाभारतात क्षात्रधर्माचे महत्त्व सांगितले आहे ते एवढ्यासाठीच. 'ज्याप्रमाणे एकट्या हत्तीच्या पावलांत इतर सर्व प्राण्यांच्या पावलांचा समावेश होतो, त्याप्रमाणे एका राजधर्मात इतर सर्व धर्माचा अंतर्भाव होतो', 'राजा हाच लोकांच्या धर्माने मूळ आहे', 'राजा हा प्रजेचे प्रौढ असे अंतःकरणच होय', 'राजा जेव्हा योग्य प्रकारे दण्डनीतीचा अवलंब करतो तेव्हाच कृतयुग निर्माण होते', 'राजा कालस्य कारणम्' अशा तऱ्हेची शेकडो वचने महाभारतात सापडतात, त्यांतील अभिप्राय सर्वस्वी खरा आहे, हे ग्रीस, रोम, पोलंड इ. पाश्रात्य देशांच्या इतिहासावरून स्पष्ट होईल. त्यांचे स्वराज्य गेले तेव्हा त्याबरोबर त्यांची संस्कृतीही अस्तास गेली. तेव्हा संस्कृतीच्या इतिहासात राजशासनाच्या इतिहासाला व राजकीय संस्कृतीला अग्रस्थान दिलेच पाहिजे यात शंका नाही. आणि सर्व मोठमोठ्या इतिहासवेत्त्यांनी ते दिलेही आहे. पूर्वसूरींचा तोच मार्ग अनुसरून प्रत्येक कालखंडाचे विवेचन करताना प्रथम राजशासनाचा व राजकीय संस्कृतीचा विचार या ग्रंथात करण्याचे धोरण आखले आहे. त्या अन्वये इ. पू. २३५ ते इ. स. १३१८ हा जो पहिला कालखंड त्यातील महाराष्ट्रावरील राजसत्तांचा आता प्रथम विचार करावयाचा आहे. त्यांपैकी सातवाहन सत्तेचा विचार गेल्या प्रकरणात आपण केलाच आहे. आता नंतरच्या वाकाटक, चालुक्य, राष्ट्रकूट, उत्तर चालुक्य व यादव यांच्या राजशासनांचा विचार करावयाचा आहे.

पाच राजघराणी
 वाकाटक घराण्याचा मूळ संस्थापक विन्ध्यशक्ती हा विष्णुवृद्धगोत्री ब्राह्मण असून तो बहुधा सातवाहनांचा एक सेनाधिकारी असावा. सातवाहन साम्राज्य विलयास गेल्यावर त्याने इ. स. २५० च्या सुमारास विदर्भामध्ये स्वतंत्र राज्याची स्थापना केली. त्याच्या या वाकाटक घराण्याने इ. स. ५५० पर्यंत म्हणजे सुमारे तीनशे वर्षे राज्य केले. उत्तरेत बुंदेलखंडापासून दक्षिणेत हैदराबादपर्यंत वाकाटक साम्राज्याचा त्याच्या वैभवाच्या काळी विस्तार झाला होता. कोसल, मेकल, मालव, कुंतल, अश्मक, मुलक एवढ्या विस्तीर्ण प्रदेशावर त्यांची सत्ता पसरली होती. कोसल म्हणजे अर्वाचीन छत्तीसगड. यात रायपूर, दुर्ग, बिलासपूर या जिल्ह्यांचा अंतर्भाव होतो. मेकल हा अमरकंटकाच्या भोवतालचा प्रदेश. मालव हा माळवा उज्जयनी प्रांत होय. कुंतल म्हणजे सातारा, कोल्हापूर, इ. दक्षिण महाराष्ट्राचा भाग होय. अश्मक, मूलक म्हणजे औरंगाबाद, नगर हा प्रदेश होय. वाकाटकांचा शेवटचा राजा हरिषेण याचे राज्य उत्तरेस माळव्यापासून दक्षिणेस कुंतलापर्यंत आणि पूर्वपश्चिमेस गंगासागर व सिंधू- सागर यांच्यापर्यंत पसरले होते.
 वाकाटकांच्या नंतर महाराष्ट्रावर बदामीच्या चालुक्यांची सत्ता प्रस्थापित झाली. जयसिंह हा चालुक्यांचा मूळपुरुष होय. हे मानव्यगोत्री क्षत्रिय घराणे होते. बदामीच्या चालुक्यांनी इ. स. ५५० पासून इ. स. ७५३ पर्यंत राज्य केले. नर्मदेपासून थेट दक्षिणेस रामेश्वरापर्यंत यांचे अधिराज्य होते. कावेरी नदीच्या दक्षिणेचे पांड्य, चोल, केरल राजे, कांचीचे पल्लव राजे, म्हैसूरचे गंगराजे, वनवासीचे कदंब, कोकणचे मौर्य या सर्वांना चालुक्यांनी अनेक वेळा जिंकून त्यांच्यापासून करभार घेतला होता व त्यांना आपले मांडलिक बनविले होते. गुजराथ, माळवा, कोसल, चेदी (जबलपुर परिसर ) या देशांवर त्यांची अधिसत्ता प्रस्थापित झाली होती. कनोजचा हर्षवर्धन हा महत्त्वाकांक्षी होता. दक्षिणेत आपले साम्राज्य स्थापण्याची त्याची मनीषा होती. पण चालुक्यराज सत्याश्रय पुलकेशी याने नर्मदेच्या उत्तरेलाच त्याला गाठून त्याचा पराभव केला व दक्षिणेवरील आपले अधिराज्य अभंग राखले. सातवाहनाप्रमाणेच त्याचे अश्व त्रिसमुद्रपीततोय होते.
 यानंतर राष्ट्रकूटांचा उदय झाला. या घराण्याचा संस्थापक दन्तिदुर्ग हा चालुक्यांचाच एक सेनापती होता. ७५४ साली त्याने संधी साधून कोसल प्रदेशातील शिरपूर, रायपूर व नागपूरजवळील रामटेक येथील राजांचा पराभव करून तेथे आपली स्वतंत्र सत्ता स्थापिली. आणि लवकरच खानदेश, नाशिक, पुणे, सातारा या प्रांतांत तिचा विस्तार केला. दन्तिदुर्गाच्या या घराण्यात गोविन्द (३ रा), कृष्ण ( ३ रा ) असे महापराक्रमी राजे झाले. पांड्य, चेर (केरळ), चोल, पल्लव (कांची ), गंग ( कर्नाटक ), वेंगी ( चालुक्यांची पूर्वेकडील शाखा ) या दक्षिणेतील सर्व राजांना जिंकुन त्यांनी रामेश्वरापर्यंत आपल्या साम्राज्याचा विस्तार तर केलाच, पण तेवढ्यावर संतुष्ट न राहता त्यांनी उत्तरेवर स्वाऱ्या करून गुजराथ, माळवा, ओरिसा हेही प्रदेश जिंकले. त्या वेळी मगधाचे वैभव नष्ट होऊन कनोज ही उत्तरेतील साम्राज्याची राजधानी झाली होती तीही राष्ट्रकूटांनी जिंकली व आपली सेना थेट हिमालयापर्यंत नेऊन भिडविली. या पराक्रमामुळे राष्ट्रकूटांची, भारताच्या इतिहासात मौर्य, गुप्त या साम्राज्यकर्त्या घराण्यांच्या इतकीच महती मानली जाते. आपली कीर्ती अशी अमर करून हे घराणे इ. ९७३ साली अस्तास गेले.
 त्यांच्यामागून चालुक्य घराणे पुन्हा उदयास आले. हे कल्याणीचे चालुक्य होत. आधीचे जे बदामीचे चालुक्य त्यांच्याशी यांचा नेमका संबंध काय हे अजून निश्चित झालेले नाही. पण ९७३ साली उदयास आलेला तैलप हा त्यापूर्वीच्या चालुक्यांच्याच दूरच्या शाखेपैकी असावा असे पंडितांचे मत आहे. तैलपाचे वंशज चालुक्य है पूर्व-चालुक्यांच्याच पदव्या घेतात व त्यांच्याप्रमाणेच आपले गोत्रही मानव्य हेच सांगतात. त्यांनी ११८९ पर्यंत महाराष्ट्रावर सत्ता चालविली. यांनीही सर्व दक्षिण जिंकली होती, आणि उत्तरेकडे स्वाऱ्या करून बंगाल, आसाम, मगध, कनोज, नेपाळ या प्रदेशांच्या राजांनाही नमविले होते. काही पंडितांच्या मते कवी बिल्हण याने केलेली ही दरबारी अतिशयोक्ती असावी. तसे काही असले तरी हे उत्तर चालुक्य बदामीच्या पूर्व चालुक्यांइतकेच पराक्रमी होते यात शंका नाही.
 ११८९ साली देवगिरीचे यादव सत्तारूढ झाले. हे सम्राटही पराक्रमी होते. दक्षिणेस कावेरीपर्यंत यांनी आपले साम्राज्य विस्तारिले होते, आणि उत्तरेस लाट (गुजराथ), माळवा या प्रदेशांवरही काही काळ आपले अधिराज्य प्रस्थापिले होते. पण हळूहळू या घराण्याचेच नव्हे, तर एकंदर महाराष्ट्राचेच ( आणि भारताचेही ) कर्तृत्व लयास जात होते. विनाशाची, विघटनेची, अधःपाताची बीजे पूर्वीच या जमिनीत पडली होती. ती रूढ होऊन त्यांना आता धुमारे फुटले होते. याची कारणमीमांसा पुढे येणारच आहे. येथे वाकाटकांपासून यादवांपर्यंतच्या महाराष्ट्रातील राज्यकर्त्या घराण्यांच्या कारकीर्दीची रूपरेखा फक्त दिली आहे. एका दृष्टिक्षेपात या हजार वर्षांच्या काळातील महाराष्ट्राच्या राजकीय इतिहासाचे चित्र आकळता यावे आणि पुढील विवेचन समजण्यास सुलभ व्हावे हा यातील हेतू. येथे एवढेच सांगावयाचे की यादवांच्या अखेरच्या काळात त्यांची सत्ता व दक्षिणच्या सर्व राजसत्ता अवघ्या दहापंधरा वर्षांच्या अवधीत मुस्लिम आक्रमणाला बळी पडल्या, हा केवळ योगायोग नाही. धर्म, समाजरचना, राजनीती, यांना इतके विपरीत रूप या काळात प्राप्त झाले होते की हा विनाश अटळ होता. पण तो पुढचा भाग आहे. एक हजार वर्षे महाराष्ट्राचे स्वातंत्र्य ज्यांनी अबाधित राखले व त्याच्या संस्कृतीला मोठे वैभव प्राप्त करून दिले त्या राजघराण्यांच्या कर्तृत्वाचे प्रथम आपल्याला अवलोकन करावयाचे आहे. प्रत्येक घराण्यात थोर कर्ते राजपुरुष कोण झाले, त्यांनी कोणता विशेष पराक्रम केला, त्यांचे स्वराज्य व साम्राज्य किती विस्तृत होते, शास्ते म्हणून त्यांची योग्यता काय होती, हे सर्व जरा तपशिलाने आपणास पहावयाचे आहे. पण त्याआधी ही सर्व घराणी महाराष्ट्रीय होती की नाही याचा निश्रय आपल्याला केला पाहिजे. सातवाहन घराण्याचा याच दृष्टीने गेल्या प्रकरणात आपण विचार केला. तसाच आता वाकाटक, बदामीचे चालुक्य, राष्ट्रकूट, कल्याणीचे चालुक्य व यादव या घराण्यांचा करावयाचा आहे. या दीड हजार वर्षांच्या काळात, महाराष्ट्राला स्वतंत्र अस्मिता होती, त्याचे स्वातंत्र्य अबाधित होते, त्याचे राजकीय कर्तृत्व असामान्य होते, ही सर्व विधाने, ही घराणी महाराष्ट्रीय होती असे सिद्ध झाले तरच सार्थ होतील. म्हणून प्रथम त्याची चर्चा करावयाची आहे. ती करताना ही घराणी डोळ्यांपुढे असणे अवश्य, म्हणून त्यांच्या इतिहासाची अगदी स्थूल रूपरेखा वर दिली आहे. त्यांच्या महाराष्ट्रीयत्वाचा निश्चय या प्रकरणात झाला म्हणजे मग पुढील प्रकरणात या पाचही घराण्यांचे राजकीय कर्तृत्व थोड्या तपशिलाने पाहू.

महाराष्ट्रीयत्वाचा निकष
 त्यांच्या महाराष्ट्रीयत्वाचा निश्चय करताना हे राजवंश मुळात कोठून आले, त्यांचे अगदी प्राचीन पूर्वज कोणत्या वर्णाचे होते ही चिकित्सा पंडित करतात. ऐतिहासिक जिज्ञासेच्या दृष्टीने व इतिहासलेखनाच्या परिपूर्तीसाठी हा शोध करणे अवश्य आहे. पण एकतर ही चिकित्सा बव्हंशी निष्फळ होते. कोणत्याही घराण्याच्या मूलस्थाना- विषयी निश्चित असा पुरावा अद्याप उपलब्ध झालेला नाही आणि येथून पुढे होण्याची फारशी आशा नाही. शिवाय ऐश्वर्यप्राप्ती झाल्यानंतर आपल्या घराण्याचा संबंध चंद्र, सूर्य या प्राचीन वंशांशी जोडून देण्याची प्रत्येक राजघराण्याची प्रवृत्ती असल्यामुळे शिलालेख किंवा ताम्रपट यांचा पुरावाही या दृष्टीने विश्वसनीय मानता येत नाही. चालुक्य आपल्याला कधी चंद्रवंशीय तर कधी सूर्यवंशीयही म्हणवितात. राष्ट्रकूट यदुवंशी म्हणवून कधी श्रीकृष्ण तर कधी सात्यकी हा आपला मूळपुरुष असे सांगतात. यामुळे अर्थातच मथुरा, अयोध्या ही त्यांची मूळस्थाने ठरतात. या विधानांना इतिहासात स्थान देणे कठीण आहे. या दृष्टीनेही मूळस्थानशोध हा व्यर्थ आहे. पण माझ्या मते या राजघराण्यांचे महाराष्ट्रीयत्व वा इतरत्व यांचा निर्णय करण्यासाठी या चिकित्सेत शिरणेच अयुक्त होय. श्रीशिवछत्रपती यांचे भोसले घराणे मूळ राजस्थानातील होते असे मत आहे. पण त्यामुळे त्यांना कोणी अमहाराष्ट्रीय मानले नाही, मानीत नाहीत. छत्रपती होण्यापूर्वी तीनशे वर्षे हे घराणे महाराष्ट्रात आले. ही भूमी त्यांनी आपली कर्मभूमी मानली. येथल्या जनतेच्या कल्याणाची त्यांनी चिंता वाहिली, येथले राज्य ते स्वराज्य मानले आणि पराक्रम करावयाचे ते सर्व येथल्या लोकांच्या समवेत, त्यांना बरोबर घेऊन, त्यांचे नेतृत्व स्वीकारून केले आणि अशा रीतीने ते महाराष्ट्राशी एकजीव होऊन गेले. त्यामुळे ते महाराष्ट्रीय झाले. कोणताही समाज वा कोणतेही राजघराणे कर्मभूमी कोणती मानते, स्वकीय कोणाला समजते, समरस कोणाशी होते, कोणत्या समाजाच्या साह्याने पराक्रम करते, कोणत्या भूमीला स्वराज्य मानते यावर त्याचे राष्ट्रीयत्व ठरत असते. हाच न्याय मनात धरून इतिहासाचार्य राजवाडे यांनी भोसले घराणे हे महाराष्ट्राचे स्वकीय ठरविले. त्यांचे मूळस्थान, त्यांच्या मते, मथुरावृंदावनाकडे होते. पण त्यावरून त्यांनी भोसल्यांना परकीय ठरविले नाही. पण आश्चर्य असे की चालुक्य, राष्ट्रकूट, यादव यांना मात्र त्यांनी हा न्याय लागू केला नाही. अयोध्या, चेदी, मथुरा या प्रदेशांतून ते आले म्हणून त्यांना ते परकीय मानतात आणि त्यांच्या राजवटीत महाराष्ट्र दास्यात होता असे म्हणतात. भोसल्यांच्या सत्तेखाली महाराष्ट्र प्रथम स्वतंत्र झाला असे त्यांचे मत आहे (राधामाधव- विलासचंपू - प्रस्तावना पृ. १७३-७४ ) राजवाड्यांच्या या विधानात नेहमीप्रमाणेच कसलीही तर्कसंगती नाही. ही सरणी पत्करली तर आर्य लोक कायमचे अभारतीय व परकीय ठरतील. तेव्हा अत्यंत तर्कदुष्ट अशी ही उपपत्ती आपण त्याज्यच मानिली पाहिजे.
 तेव्हा आता वर सांगितलेल्या विचारसरणीचा आश्रय करून वाकाटक, चालुक्य, राष्ट्रकूट, उत्तर चालुक्य व यादव ही घराणी महाराष्ट्रात स्वकीय होती की परकीय याचा विचार करू.


वाकाटक
 वाकाटकांनी इ. स. २५० ते इ. स. ५५० असे सुमारे तीनशे वर्षे महाराष्ट्रावर राज्य केले, हे मागे सांगितलेच आहे. यांचे मूळ घराणे उत्तरभारतातील असावे असे व्हिन्सेंट स्मिथ, डॉ. जयस्वाल इ. पंडितांचे मत आहे. झाशी जिल्ह्यात सध्या बागाट नावाचे एक गाव आहे. तेच पूर्वीचे वाकाट असावे व वाकाटक घराणे तेथलेच असावे असा त्यांचा तर्क आहे. महामहोपाध्याय प्राचार्य वा. वि मिराशी यांनी 'वाकाटक नृपति आणि त्यांचा काल' या आपल्या ग्रंथात या मताचे खंडन करून वाकाटक दाक्षिणात्य होते, असे सिद्ध करण्याचा प्रयत्न केला आहे. पण त्याने समाधान होत नाही व हा प्रश्न अनिर्णीतच राहतो. पण वर सांगितल्याप्रमाणे प्रस्तुतच्या दृष्टीने त्याचे फारसे महत्त्व नाही. वाकाटकांची कर्मभूमी कोणती होती, ते स्वभूमी कोणत्या प्रदेशाला मानीत आणि साम्राज्यातील प्रदेश कोणत्या राज्यांना मानीत, कोणत्या जनतेशी ते एकजीव होत, इ. वर सांगितलेल्या अनेक गोष्टींना महत्त्व आहे. ते खरे निकष होत. त्यांवरून हे निर्विवाद सिद्ध होते की वाकाटक हे महाराष्ट्रीय होत.
 त्यांचा मूळपुरुष विंध्यशक्ती हा सातवाहनांच्या राज्यात एक सेनापती असून त्यांच्या पडत्या काळी त्याने स्वतंत्र राज्य स्थापले असावे असे पंडितांचे अनुमान आहे. पण शिलालेख व ताम्रपट यांच्या आधारे आज हे मात्र निश्रित सिद्ध झाले आहे की वाकाटकांच्या राज्याची स्थापना प्रथम विदर्भात झाली. रामटेकजवळील नंदिवर्धन ही त्यांची राजधानी असून वत्सगुल्म (वाशीम), प्रवरपुर ( पवनार ) या त्यांच्या नंतरच्या राजधान्या होत्या. विंध्यशक्तीचा पुत्र पहिला प्रवरसेन हा पहिला वाकाटक सम्राट होय. त्याने साठ वर्षे राज्य केले आणि बुंदेलखंडापासून हैदराबादपर्यंत आपल्या साम्राज्याचा विस्तार केला. त्यानंतर त्याच्या साम्राज्याची त्याच्या चार पुत्रांत विभागणी झाली. त्यातील एका शाखेची वाशीम ही राजधानी होती.
 सातवाहन हे प्राकृत भाषेचे अभिमानी होते व आपल्या राज्यात व साम्राज्यात त्यांनी सर्वत्र महाराष्ट्री प्राकृत भाषाच चालू करण्याचा आग्रह धरला होता, हे गेल्या प्रकरणात सांगितलेच आहे. इसवी सनाच्या तिसऱ्या चौथ्या शतकापासून पुराण- रचना करणाऱ्या वैदिक संस्कृतीच्या अभिमानी पक्षाचा प्रभाव फारच वाढला आणि संस्कृत भाषेला पुन्हा पूर्वीचे स्थान प्राप्त झाले. अखिल भारतात शास्त्री, पंडित, वैदिक, राजे, महाराजे, सेनापती या सर्वांनी तिचाच आश्रय केला आणि सर्व वाङ्मय- रचना संस्कृतातच होऊ लागली. बौद्ध, जैन यांनी जनतेत धर्मप्रचार करण्याच्या हेतूने प्रारंभी पाली, अर्धमागधी यांचा आश्रय केला होता. पण या काळात संस्कृतचे वर्चस्व एवढे झाले की त्यांनीही संस्कृतात ग्रंथरचना करण्यास प्रारंभ केला. अशा स्थितीत राजेमहाराजे यांनी आपले शिलालेख व ताम्रपट संस्कृतात लिहिले असल्यास नवल नाही. गुप्त सम्राटांनी संस्कृतलाच आश्रय दिला आणि त्यांचेच अनुकरण अकराव्या-बाराव्या शतकापर्यंत सर्व राज्यकर्त्यांनी केले. वाकाटकही त्याला अपवाद नव्हते. त्यांचे बहुतेक सर्व ताम्रपट आणि शिलालेख व त्यांच्या सचिवांचे व मांडलिकांचेही कोरीव लेख संस्कृतातच आहेत.
 आपल्या दृष्टीने महत्त्वाची गोष्ट अशी की हे सर्व लेख नागपूर, वऱ्हाड या प्रांतांतील म्हणजे महाराष्ट्रातले आहेत आणि त्यांतील काही लेख महाराष्ट्री प्राकृतात आहेत. म. म. मिराशी यांनी आपल्या ग्रंथात हे सर्व कोरीव लेख दिलेले आहेत आणि त्यांचा स्थलनिश्रयही केलेला आहे. त्यावरून असे दिसते की देवटेकजवळचे चिकमारा, हिंगणघाट, वर्धा जिल्ह्यातील मांडगाव, अमरावती जिल्ह्यातील घाटलडकी, मातुकली, कारंजा, असतपूर, अंजनवाडी, चांदा, वरदाखेट ( वरुड), नांदेड या गावचे हे ताम्रपट आहेत. ही सर्व गावे नागपूर, वऱ्हाड, मराठवाडा या प्रांतांतील आहेत हे स्पष्टच आहे. अंजठाच्या लेण्यांपैकी १६, १७ व १९ या क्रमांकाची लेणी वाकाटकांच्या कारकीर्दीत त्यांनी वा त्यांच्या सचिवांनी कोरलेली असून त्यांतील १६ व्या लेण्यात त्यांची वंशावळ दिलेली आहे. अजंठ्याच्या पश्चिमेस अकरा मैलांवर असलेल्या गुलवाडा या गावाजवळच्या घटोत्कच लेण्यात शेवटचा वाकाटक राजा हरिषेण याचा मंत्री वराहदेव याचा एक कोरीव लेख असून त्यात 'देवराजसूनुर्हरिषेणो' असा आपल्या स्वामीचा त्याने आदरपूर्वक उल्लेख केला आहे. वाकाटकांच्या सचिवांनी कोरविलेली लेणी जशी महाराष्ट्रात आहेत तशीच त्यांनी बांधलेली मंदिरेही महाराष्ट्रातच आहेत. पहिल्या प्रवरसेनाने बांधलेले प्रवरेश्वराचे देवालय, रामगिरीवरचे रामगिरी- स्वामीचे देवालय, अश्वत्थखेटकातील विष्णूचे मंदिर आणि द्वितीय प्रवरसेनाने प्रवर पूर ( पवनार ) येथे बांधलेले श्रीरामचंद्राचे मंदिर ही मंदिरे यांची साक्ष देतील. ही मंदिरे आता बहुतेक उद्ध्वस्त झाली आहेत. पण काहींचे अवशेष आहेत व काहींचा त्यांच्या ताम्रपटांत निर्देश आहे.
 वाकाटक पूर्णपणे महाराष्ट्रीय झाले होते याचा आणखी एक पुरावा म्हणजे त्यांनी संस्कृतप्रमाणेच प्राकृत साहित्यालाही आश्रय दिला होता हा होय. त्यांनी प्राकृताला आश्रय दिला होता, एवढेच नव्हे, तर स्वतः प्राकृतात ग्रंथरचनाही केली होती. वत्सगुल्म शाखेचा संस्थापक सर्वसेन याचे ' हरिविजय ' आणि नन्दिवर्धन शाखेचा द्वितीय प्रवरसेन याचे 'सेतुबंध' ही प्रसिद्ध काव्ये महाराष्ट्री प्राकृतात आहेत. शिवाय या राजांनी प्राकृतात सुभाषितेही रचली होती. हाल सातवाहन राजाने रचलेल्या ' गाहा सत्तसई' या ग्रंथात नंतरच्या काळात बरीच भर पडलेली आहे. त्यातील २१७, २३४, ५०४ व ५०५ या गाथा सर्वसेनाच्या म्हणून टीकाकारांनी मान्य केलेल्या आहेत. प्रवरसेनाच्याही नावावर ४५, ६४, २०२, २०८ व २४६ या गाथा नोंदलेल्या आहेत. काही टीकाकारांच्या मते आणखी ८/१० गाथा प्रवरसेनाच्या आहेत. त्यांनी त्यांचे क्रमांकही दिले आहेत. ( वाकाटक नृपती व त्यांचा काळ, मिराशी, पृ. ११५-१२९).
 वाकाटकांचे मूळ राज्य नागपूर, विदर्भ, कुन्तल, अश्मक, मूलक या महाराष्ट्रातील प्रदेशात होते व त्यांचे साम्राज्य माळवा, कोसल, लाट, कलिंग व आंध्र या प्रदेशावर होते. त्यांचे बहुतेक सर्व कोरीव लेख, त्यांनी बांधलेली मंदिरे व त्यांच्या कारकीर्दीत कोरलेली लेणी विदर्भ, मराठवाडा या महाराष्ट्रातील प्रदेशात होती. त्यांनी महाराष्ट्री प्राकृताला आश्रय देऊन त्या भाषेत स्वतः काव्यरचनाही केली. एवंच त्यांचे सर्व कर्तृत्व महाराष्ट्रात झाले व त्यांची ही कर्मभूमी होती, हे निश्रित सिद्ध झाल्यामुळे हे राजघराणे महाराष्ट्राचे होते याविषयी शंका घेण्यास जागा राहात नाही.

दृढ अस्मिता
 इ. सनापूर्वी तिसऱ्या शतकात महाराष्ट्राला पृथगात्मता आली आणि त्याच वेळी या भूमीचे स्वतंत्र राज्य प्रस्थापित करणारे सातवाहन राजघराणे त्याला लाभले. या पहिल्या घराण्याचे राज्य साडेचारशे वर्षे टिकले. त्यानंतर पन्नासपाऊणशे वर्षे महाराष्ट्रावर आभीर या शकुशाणांप्रमाणेच परकीय असलेल्या जमातीचे राज्य होते. पण सुदैवाने लवकरच वाकाटक नृपती विन्ध्यशक्ती याचा उदय झाला आणि त्याच्या घराण्याने सुमारे तीनशे वर्षे महाराष्ट्रावर राज्य केले. याचा अर्थ असा की प्रारंभापासून म्हणजे इ. स. पूर्व २३५ पासून इ. स. ५५० पर्यंत म्हणजे प्रारंभीची सुमारे ८०० वर्षे महाराष्ट्राला स्वकीय राजसत्तेखाली राहण्याचे भाग्य लाभले. महाराष्ट्राची अस्मिता यामुळे निश्चित आणि दृढ होऊन गेली.

वादग्रस्त विषय
 पुढील काळात इ. स. ११८९ पर्यंत सहाशे साडेसहाशे वर्षे या भूमीवर बदामीचे चालुक्य, राष्ट्रकूट व कल्याणीचे चालुक्य या घराण्यांची सत्ता होती. आणि यांच्या महाराष्ट्रीयत्वाविषयी तीव्र वाद आहेत. माझ्या मते ही तीनही घराणी महाराष्ट्रीयच होती, हे सिद्ध करण्यास पुरेसा पुरावा आहे. तोच आता मांडावयाचा आहे. पण त्याआधी, आधीच्या थोर अभ्यासकांची मते काय आहेत, वादाचे स्वरूप काय आहे, अनुकूलप्रतिकूल कोण आहेत, त्यांची प्रमाणे काय आहेत, त्यांचा विचार केला पाहिजे. तो सर्व करून, या पंडितांच्या मतांचा परामर्श घेऊन, नंतर माझे मत मी मांडतो.
 डॉ. रा. गो. भांडारकरांच्या मते राष्ट्रकूट हे महाराष्ट्राचे खरे स्वदेशीय राजे होत. आंध्र, चालुक्य यांना ते मूळचे परस्थ मानतात. पण यासंबंधी त्यांनी कसलीच कारणमीमांसा केलेली नाही, काही उपपत्तीही सांगितलेली नाही ( कलेक्टेड वर्क्स, खंड ३ रा, पृ. ८५ ). आंध्राविषयी त्यावेळी पुरेसे संशोधन झाले नव्हते. त्यामुळे त्यांना त्यांनी विदेशमूल मानले तर नवल नाही. पण चालुक्य परकीय कसे तेही त्यांनी सांगितलेले नाही. त्यामुळे त्यांच्या मताची चर्चा करता येत नाही.
 कुलगुरू चिंतामणराव वैद्य यांनी या विषयाची आपल्या ' मध्ययुगीन भारत' या ग्रंथाच्या पहिल्या व दुसऱ्या खंडात बरीच चर्चा करून चालुक्य, राष्ट्रकुट, उत्तर चालुक्य, कांचीने पल्लव ही सर्व घराणी अस्सल मराठा घराणी होती असा सिद्धान्त मांडला आहे. चालुक्य, राष्ट्रकूट या घराण्यांचे ताम्रपट, शिलालेख संस्कृताप्रमाणेच कानडीत आहेत. काही पंडितांच्या मते त्यांची मातृभाषा कानडी होती. यामुळे ही घराणी कानडी होत, असे त्यांचे मत आहे. पण वैद्यांच्या मते हा प्रश्न भाषेचा नसून वंशाचा आहे. चालुक्य, राष्ट्रकूट, पल्लव ही घराणी आर्य क्षत्रिय आहेत. चालुक्य राजे स्वतःला प्रारंभापासून हारितीपुत्र व मानव्यगोत्री म्हणवितात. तर राष्ट्रकूट अत्रिगोत्री म्हणवितात. कदंब, पल्लव हेही त्यांच्या मते आर्यच होत. चाळके, कदम, पालवे ही शाण्णव कुळीच्या मराठ्यांत जी नावे आहेत ती चालुक्य, कदंब, पल्लव यांवरूनच आलेली आहेत. या मराठ्यांतील भाले, खंडागळे ही राष्ट्रकूटांची नावे होत. तेव्हा हे सर्व आर्यक्षत्रिय असून शाण्णव कुळीच्या मराठ्यांत त्यांची गणना होते. म्हणून ही सर्व घराणी मराठा होत असे चिंतामणराव म्हणतात ( मध्ययुगीन भारत, खंड १ ला, पुस्तक १ ले, पृ. ११२ - ११६, पुस्तक २ रे, पृ. १७५, खंड २ रा, पृ. २४९ ).
 चिंतामणराव वैद्य यांचा हा युक्तिवाद टिकण्याजोगा आहे असे वाटत नाही. ही सर्व घराणी आर्य क्षत्रिय होत याबद्दल वाद नाही. पण या क्षत्रियत्वावरून व त्यांच्या गोत्रांवरून ती मराठी कशी ठरतात ते कळत नाही. त्यांच्याच मताने ही सर्व घराणी प्राचीन काळी उत्तरेतून आलेली आहेत. यदू, मनू हे त्यांचे मूळपुरुष होत. त्यामुळे त्यांतील काही सोमवंशी तर काही सूर्यवंशी ठरतात. यावरून ती आर्य ठरतील, क्षत्रिय ठरतील. आता ती महाराष्ट्रात राहिली म्हणून जर ती महाराष्ट्रीय मराठा ठरली तर त्यांच्यांतील पल्लव, कदंब ही घराणी आणखी दक्षिणेकडे जाऊन कांची, वनवासी या प्रदेशात राहिली तर ती तामिळी, कर्नाटकी ठरली पाहिजेत. पण वैद्यांच्या मते हे सर्व वंशावर व गोत्रांवर अवलंबून आहे. पण वंशावरून व गोत्रावरून, वर म्हटल्याप्रमाणे ती आर्य व क्षत्रिय ठरतील. तेवढ्यावरून त्यांना मराठा ठरविता येईल असे वाटत नाही. शिवाय भांडारकरांच्या प्रमाणेच एके ठिकाणी राष्ट्रकूट राजवंशाची प्रस्थापना करणारा राजा दन्तिराज (दन्तिदुर्ग) याच्याविषयी त्यांनी ' महाराष्ट्र देशास स्वातंत्र्य देणारा पहिला हाच राजा होय,' असे म्हटले आहे. (खंड २ रा, पृ. २३८). याचा अर्थ चालुक्यांच्या काळी महाराष्ट्र परतंत्र होता, मांडलिक होता असा होतो ! चालुक्य मराठे असताना त्यांच्या सत्तेखाली महाराष्ट्र परतंत्र होता या म्हणण्यात तर्कसंगती काय ते कळत नाही.
 पूर्व चालुक्यांची राजधानी बदामी ही विजापूर जिल्ह्यात आहे. त्यांचे अनेक ताम्रपट कानडीत आहेत. म्हणून ते मूळचे कानडी असावे असे अनेक पंडितांचे मत आहे. भारतीय विद्या भवनाच्या 'दि हिस्टरी अँड कल्चर ऑफ इंडियन पीपल' या प्रसिद्ध इतिहासात डॉ. डी. सी. सरकार यांनी असेच मत दिले आहे (दि क्लासिकल एज, खंड ३ रा, पृ. २२७ ). राष्ट्रकूट यांची मातृभाषा कानडी होती, त्यांचे ताम्रपट कानडीत आहेत, त्यांनी कानडी वाङ्मयाला उत्तेजन दिले, त्यांतील काही राजांनी स्वतः कानडीत ग्रंथरचनाही केली, ही कारणे देऊन डॉ. अ. स. आळतेकर यांनी हे घराणे मूळचे कानडी होते असा निष्कर्ष काढला आहे (दि राष्ट्रकूटाज अँड देअर टाइम्स, पृ. १८-२३) चालुक्य व राष्ट्रकूट यांचे ताम्रपट कानडीत होते व त्यांच्यापैकी काहींनी कानडी वाङमयाला उत्तेजन दिले ही वस्तुस्थितीच आहे. ती कोणालाही नाकारता येणार नाही. असे असतानाही ही घराणी महाराष्ट्रीय होती असे म्हणणाऱ्यांवर फारच मोठी जबाबदारी येते यात शंका नाही. ऐतिहासिक प्रमाणांच्या बळावर ती जबाबदारी पेलता येणे शक्य आहे, असे मला वाटते.
 या घराण्यातील राजे आपले स्वराज्य कोणत्या भूमीला मानीत होते, त्यांची कर्मभूमी कोणती होती, त्यांनी पराक्रम कोणत्या लोकांच्यासह केले, कोणत्या समाजाशी ते एकरूप झाले, या निकषावर निर्णय करावयाचा आहे, हे वर सांगितलेच आहे. या दृष्टीने प्रथम चालुक्यांचा विचार करू.

चालुक्य महाराष्ट्रीय
 चालुक्यांचा पहिला स्वतंत्र राजा म्हणजे पुलकेशी ( १ ला ) हा होय. इ. स. ५३५ ते ५६६ असे बत्तीस वर्षे त्याने राज्य केले. पण त्याच्या आधी त्याचा पितामह जयसिंह याने स्वराज्यस्थापनेच्या उद्योगास प्रारंभ केला होता. त्याचा मुलगा रणराग याने तो उद्योग पुरा करीत आणला होता. जयसिंह व रणराग हे मूळचे विजापूर जिल्ह्यातील बदामीच्या परिसरातील होत. पण त्यांनी प्रथम राज्य स्थापिले ते सातारा, कोल्हापूर या दक्षिण महाराष्ट्र विभागात. त्या काळी या विभागात एका राष्ट्रकूट घराण्याचे राज्य होते. हे राष्ट्रकूट म्हणजे चालुक्यानंतर सम्राटपदावर आलेले राष्ट्रकूट नव्हत. राष्ट्रकूटांची अनेक घराणी प्राचीन काळापासून महाराष्ट्रात होती. त्यांतलेच साताऱ्यातील मानपूर म्हणजे अलीकडचे जे माणगाव तेथले हे घराणे होय. वाका- टकांच्या पडत्या काळात या मानपूरच्या राष्ट्रकूट घराण्याने बराच राज्यविस्तार केला होता. या राष्ट्रकूटांचा पराभव करून चालुक्यांनी आपले राज्य स्थापिले, असे प्रथम डॉ. रा. गो. भांडारकरांनी 'अर्ली हिस्टरी ऑफ दि डेक्कन' या ग्रंथात सांगितले होते ( पृ. ६७ ). म्हैसूर विद्यापीठाचे प्राध्यापक डॉ. एम. एच. कृष्ण यांनी सध्याच्या मराठा प्रदेशात इ. स. ४७० नंतर बरीच वर्षे राष्ट्रकूट घराणे राज्य करीत होते व त्यांच्यापासून ते राज्य चालुक्यांनी घेतले असेच मत मांडले आहे ( के. व्ही. रंगास्वामी अयंगार कमेमोरेशन व्हॉल्यूम, दि अर्ली राष्ट्रकूटाज ऑफ महाराष्ट्र, पृ. ५५ ). हे राष्ट्रकूट घराणे म्हणजे मानपूरचे - माणचे - राष्ट्रकूट घराणेच होय, असे म. म. मिराशी यांनी नवीन सापडलेल्या शिलालेखांच्या आधारे सिद्ध केले आहे ( संशोधन मुक्तावली, सर ३ रा, पृ. ९५ ) आणि मिराशींचे हे मत बहुमान्य झाले आहे (दि क्लासिकल एज, विद्याभवन, पृ. २००). याचा अर्थ असा की चालुक्यांनी स्वराज्याची स्थापना महाराष्ट्रात केली आणि तेथेच त्यांच्या वैभवाचा पाया घातला गेला.

स्वराज्य आणि साम्राज्य
 मग या चालुक्यांचा कर्नाटकाशी संबंध कोणत्या प्रकारचा होता ? कर्नाटकावर चालुक्यांचे साम्राज्य होते. त्यांच्या दक्षिणेतील बहुतेक सर्व राज्यकर्त्यांशी नित्य लढाया चालु असत. कांचीचे पल्लव हे त्यांचे कायमचे वैरी. त्यांच्याशी दर पिढीला एकदा तरी लढाई व्हावयाची हा या पश्चिम चालुक्यांच्या राजवटीचा नियमच होता. पल्लवांचे राज्य आजच्या मद्रास प्रदेशात होते. त्यांच्या पलीकडे कावेरीच्या दक्षिणेस पांड्य, चोल व चेर (केरळ) ही राज्ये होती. यांनाही चालुक्यांनी अनेक वेळा जिंकून आपले मांडलिक बनविल्याचे इतिहास सांगतो. पश्चिमेच्या बाजूस कावेरीच्या उत्तरेस व तुंगभद्रेच्या दक्षिणेस गंग, वनवासी, बाण, अलूप ही राज्ये होती. हा कर्नाटक प्रांत होय. वनवासी व वैजयंती हा कदंबाचा प्रांत म्हणजे उत्तर म्हैसूर होय. आणि गंगांचा गंगवाडी म्हणजे दक्षिण म्हैसूर होय. अलूपांचे राज्य शिमोगा जिल्ह्यातील उडुपी येथे होते. या सर्व कानडी राज्यांशी चालुक्यांचे अखंड वैर होते. त्यांच्यावर स्वाऱ्या करून चालुक्य सम्राट कीर्तिवर्मा, पुलकेशी २ रा, विनयादित्य यांनी त्यांना अनेक वेळा मांडलिक बनविले होते, आणि त्यांना नमवून मांडलिक बनविण्यात चालुक्यांना भूषण वाटत असे, असे त्यांच्या कोरीव लेखांवरून दिसते. आता त्यांना नमविल्यानंतर त्यांच्याशी स्नेह जोडून त्यांच्याशी सोयरीक केल्याचेही उल्लेख इतिहासात आहेत. पण तो भाग निराळा. त्यामुळे कर्नाटक प्रदेश हे बदामीचे चालुक्य स्वराज्य मानीत नसत हे विधान बाधित होत नाही. पल्लवांच्या इतके नाही पण त्याच्या खालोखाल कदंब, गंग, अलूप यांशी चालुक्यांचे वैरच होते. याचा स्पष्ट अर्थ असा की पांड्य, चोल, केरल, पल्लव, कलिंग, आंध्र हे चालुक्यांना परके, तसेच कर्नाटकातले लोकही चालुक्यांना परके होते. ते त्यांचे स्वजन नव्हते. त्यांनी पराक्रम केला, वैभव प्राप्त करून घेतले ते सर्व महाराष्ट्रीयांसमवेत होय. इतर प्रदेशांत मूळ सत्ता स्थापून त्यांनी महाराष्ट्राला मांडलिक बनविल्याचे त्यांच्या वंशाच्या इतिहासात, एकाही कोरीव लेखात म्हटलेले नाही. त्यांचे महाराष्ट्रात स्वराज्य होते व इतर प्रांतांवर साम्राज्य होते.

उपार्जित स्वराज्य ।
 चालुक्यांच्या एका शिलालेखात याच शब्दात हा भेद स्पष्ट केला आहे. सत्याश्रय पुलकेशी २ रा, याचा पुतण्या नागवर्धन याने एक गाव ब्राह्मणाला दान दिले. त्याचा ताम्रपट डॉ. रा. गो. भांडारकर यांनी मूळ संहिता व भाषांतर यांसह दिला आहे. हा ताम्रपट गोपराराष्ट्रातला म्हणजे नाशिक जिल्ह्यातला असून इगतपुरीपासून बारा मैलांवरचे बलेग्राम हे गाव दान देण्यासाठी तो लिहिलेला आहे ( कलेक्टेड वर्क्स, खंड ३ रा, पृ. ७३ व २७२ ). या ताम्रपटात पुलकेशीचे वर्णन केले आहे. हा पुलकेशी कीर्तिवर्म्याचा पुत्र. कीर्तिवर्मा मृत्यू पावला तेव्हा तो लहान होता. म्हणून कीर्तिवर्म्याचा भाऊ मंगलीश हा गादीवर आला. पण पुढे सिंहासन आपल्याच मुलाला मिळावे, पुलकेशीला बाजूला सारावे असा डाव त्याने रचला. पण आता पुलकेशी तरुण व समर्थ झाला होता. त्याने हा डाव हाणून पाडला व आपले राज्य परत मिळविले. त्याचे वर्णन करताना नागवर्धन म्हणतो की पुलकेशीने प्रथम स्वराज्य ताब्यात घेतले व नंतर चेर, चोल, पांड्य यांना जिंकले. (प्रवरतुरंगमेण उपार्जित- स्वराज्य-विजितचेरचोलपांड्यक्रमागतराज्यत्रयः ।) हे स्वराज्य कोणते ? मंगलीशाच्या राज्यविस्तारावरून याची कल्पना येईल. कारण प्रथम पुलकेशीने ते ताब्यात घेतले होते. मंगलीशाच्या राज्याचे वर्णन करताना मध्य व उत्तर मराठा मुलुख त्याचप्रमाणे कोकण हा सर्व प्रदेश त्याच्या ताब्यात होता असे 'क्लासिकल एज' या ग्रंथात म्हटले आहे ( भारतीय विद्याभवन प्रकाशन, पृ. २३३ ) पुलकेशीचे हे स्वराज्य होते. आणि चेर, चोल, पांड्य आणि वर उल्लेखिलेले गंग, वनवासी इ. प्रांत यावर त्याचे साम्राज्य होते. चालुक्यांचे ताम्रपट कानडीत असले तरी त्यांचे स्वराज्य महाराष्ट्रात होते. ही भूमी त्यांची कर्मभूमी होती. येथले लोक त्यांचे स्वजन होते. गंगवाडी, वनवासी येथले कर्नाटकी लोक त्यांना परकी होते.
 रविकीर्ती कवीने रचलेल्या ऐहोळी शिलालेखातील प्रशस्तीवरून हा विचार आणखी स्पष्ट होईल. मंगलीश व पुलकेशी यांची यादवी सुरू होऊन मंगलीश मारला गेला व चालुक्य सत्ता डळमळली. हे पाहताच त्यांच्या ताब्यातील अनेक सामंतांनी उठावणी केली. अप्पायिक व गोविंद या दोन सामंतांनी पुलकेशीवर प्रथम चाल केली. त्यांचा सामना भीमा नदीच्या उत्तरेस झाला. यातील गोविंद हा राष्ट्रकूट असून तो मानपूरचा राष्ट्रकूट होता ( म. म. मिराशी, संशोधनमुक्तावली, सर ३ ग, पृ. १०२ ). यावरून पुलकेशीने प्रथम कोणता प्रदेश जिंकला, त्याचे स्वराज्य कोणते होते याची कल्पना येईल. पुलकेशीने पुढे जे विक्रम केले त्याचे वर्णन वरील प्रशस्तीत आहे, त्यावरूनही या विचाराला पुष्टी मिळते. पुलकेशीने वनवासी, गंग, अलूप, कोकण, पुरी (दंडा- राजपुरी ), लाट, मालव, गुर्जर, कलिंग, कोसल, पिष्टपूर, कांची, चोल, पांड्य हे प्रदेश जिंकल्याचे वर्णन त्या लेखात आहे. या प्रदेशांचे भौगोलिक स्थान पाहाता महाराष्ट्राभोवतालच्या वर्तुळरेषेत ते येतात असे दिसून येईल. या वर्णनात महाराष्ट्रातले कुन्तल, नासिक्य, अश्मक, मूलक, विदर्भ हे प्रांत जिंकल्याचा उल्लेखसुद्धा नाही. याचा अर्थ ते सर्व आधीच पुलकेशीच्या ताब्यात होते असा होतो. ते त्याने जिंकलेच नव्हते, असे म्हणणे शक्य नाही. कारण भोवतालचे प्रांत जिंकीत जाऊन मधलाच हा प्रदेश तो मोकळा ठेवील हे अशक्य होय. शिवाय त्याचा भाऊ विष्णुवर्धन याचे इ. स. ६१५-१६ सालचे कोल्हापूर, सातारा प्रदेशातील दानलेख उपलब्ध झाले आहेत. त्यावरून तो प्रदेश पुलकेशीच्या ताब्यात होता याबद्दल शंका राहातच नाही. यावरून कुन्तल (कोल्हापूर, सातारा ), नाशिक, अश्मक ( मराठवाडा ), विदर्भ हा प्रदेश म्हणजे महाराष्ट्र हेच चालुक्याचे स्वराज्य होते हे निर्विवाद होय.

तीन महाराष्ट्र
 या प्रशस्तीतील २५ व्या श्लोकात, पुलकेशी ९९००० गावे असलेल्या तीन महाराष्ट्रांचा राजा झाला, हे सुप्रसिद्ध वचन होय. वनवासी, गंग, कोकण, लाट, मालव, गुर्जर हे प्रदेश जिंकल्याचे वर्णन १८ ते २२ या श्लोकांत आहे. यावरून त्यानंतर त्याने महाराष्ट्र जिंकला असा अर्थ कोणी करतात. पण तसा अर्थ होणार नाही. कारण २३ व्या श्लोकात त्याने हर्षाचा पराभव केल्याचे वर्णन आहे. पुलकेशीचा व हर्षाचा संग्राम झाला तो इ. स. ६२९-३० साली. त्याआधीच त्याने महाराष्ट्र जिंकला होता हे आप्पायिक गोविंदाची उठावणी व विष्णुवर्धनाचे दानलेख यावरून निश्चित होते. तेव्हा वनवासी, गंग ते कांची या दिग्विजयाआधी पुलकेशीने महाराष्ट्रात आपली सत्ता दृढ केली होती म्हणजेच ते त्याचे स्वराज्य होते यात शंका नाही.
 तीन महाराष्ट्रांचा तो राजा झाला, या विधानाची मागे दुसऱ्या प्रकरणात चर्चा केली आहे. गंग, वनवासी, कोकण, लाट, मालव, गुर्जर या सर्वाचा समावेश त्या वेळी महाराष्ट्रात होत असे, असे शं. रा. शेंडे म्हणतात. त्या विधानाला अन्यत्र कोठेच पुष्टी मिळत नसल्यामुळे ते मान्य करणे कठीण आहे, असे तेथे म्हटले आहे. डॉ. डी. सी. सरकार यांच्या मते महाराष्ट्र, कोकण व कर्नाटक हे ते तीन महाराष्ट्र होत. (क्लासिकल एज, पृ २३८ ). पण येथे तीन महाराष्ट्र याचा तीन मोठी राज्ये असा अर्थ त्यांनी केला आहे. पण कर्नाटक, कोकण, लाट (गुजराथ), माळवा, गुर्जर (राजस्थान ) एवढे प्रांत जिंकल्यानंतर वरील तीन प्रदेशांचाच निराळा उल्लेख 'मोठी राज्ये ' असा करण्याचे कारण काय ते समजत नाही. गुजराथ, माळवा, राजस्थान ही राज्ये कोकणापेक्षा निश्चित मोठी आहेत, त्या वेळीही होती. तेव्हा तीन महाराष्ट्र याची नेमकी विवक्षा कवीच्या मनात काय होती ते सांगणे कठीण आहे असे वाटते. याचा विदर्भ, मराठवाडा व कुंतल असाही अर्थ कोणी करतात.

चिनी प्रवासी
 सत्याश्रय पुलकेशी २ रा हा महाराष्ट्राचा राजा होता, त्याचे स्वजन महाराष्ट्रीय होते, त्याने दिग्विजय केले ते मराठा सेनेच्या बळावर केले आणि त्यामुळे तो महाराष्ट्रीय होता, हे त्यावरून निश्चित सिद्ध होईल. त्यासाठी आणखी पुरावा हवा आहे. असे वाटत नाही. आणि हवाच असेल तर तो युएनत्संग या चिनी प्रवाशाने तो दिला आहे. हा प्रवासी इ. स. ६४१ च्या सुमारास महाराष्ट्रात आला होता. त्याने सत्याश्रय पुलकेशी याची भेटही घेतली होती. पुलकेशीची राजधानी भडोचपासून १६७ मैल आहे असे तो म्हणतो. चालुक्यांची राजधानी बदामी ही भडोचपासून ४३५ मैल आहे. तेव्हा तिचा उल्लेख असणे शक्य नाही. म्हणून हा उल्लेख वेरूळचा असावा व ती चालुक्यांची दुय्यम राजधानी असावी असे डॉ. डी. सी. सरकार यांचे अनुमान आहे. आपल्या प्रवासवर्णनात ह्यूएनत्संग याने महाराष्ट्र देश, महाराष्ट्र- जन व त्यांचा राजा पुलकेशी यांचा अतिशय गौरव केला आहे. या महाराष्ट्रीय जनांची आपल्या राजावर अनन्य भक्ती होती आणि तोही त्यांच्या बळावर भोवतालच्या राजांना तुच्छ लेखीत असे, असे तो म्हणतो. चालुक्यांचे राज्य म्हणजे महाराष्ट्र देश असेच त्याचे मत होते ( डॉ. डी. सी. सरकार, क्लासिकल एज, पृ. २३६-४० ).
 कांचीच्या पल्लवांविषयी मागील प्रकरणी सांगितलेला विचार येथे लक्षणीय आहे. हे पल्लव मूळचे तामीळ नव्हत. त्यांची भाषा महाराष्ट्री प्राकृत होती. तरी त्यांनी तामीळनाड प्रांत स्वतःची कर्मभूमी मानली; पराक्रम त्या लोकांसमवेत केला, त्यांना स्वजन मानले. त्यामुळे ते तामीळच होत, असे तेथे म्हटले आहे. ते मूळचे कोठले हे निश्चित सांगता येत नाही. पण माझ्या मते त्याला महत्त्व नाही.
 चालुक्य हे महाराष्ट्राला स्वभूमी मानीत व मराठ्यांना स्वजन मानीत याला आणखीही एक प्रमाण मांडता येईल. ते असे की त्यांचे बहुसंख्य दानलेख महाराष्ट्रातच सापडले आहेत त्यामुळे असे दिसते की त्यांच्या दानगंगेचा ओघ महाराष्ट्रातच वहात होता. चिपळूण, वेंगुर्ले, नेरूर ( सावंतवाडी), सामनगड ( कोल्हापूर ), मिरज, सातारा, इगतपुरी, या ठिकाणी किंवा त्यांच्या आसपास चालुक्यांचे पुष्कळसे ताम्रपट सापडले आहेत ( भांडारकर, कलेक्टेड वर्क्स, खंड ३ रा, प्रकरण १० वे ). या परिसरातील गावे यांनी दान दिली आहेत आणि ब्राह्मणांना अग्रहार देऊन त्यांच्या वसाहती वसविल्या आहेत. चालुक्य या भूमीशी कसे एकजीव झाले होते ते यावरून दिसून येईल.

पुलकेशीचे वारस
 सरतेशेवटी बंगालचे इतिहासपंडित रमेशचंद्र दत्त यांचे चालुक्यांच्या महाराष्ट्रीयत्वाविषयीचे मत पाहून चालुक्यांविपयीचा हा विचार संपवू. ते म्हणतात, 'शिलादित्याने ( हर्षाने ) इतर अनेक राजांचा पराभव करून त्यांना मांडलिक बनविले. पण पुलकेशीला त्याला केव्हाही जिंकता आले नाही. उलट पुलकेशीनेच त्याचा पराभव करून स्वाभिमानी मराठ्यांचे स्वातंत्र्य अबाधित राखले एक हजार वर्षांनंतर या पुलकेशीच्याच वारसाने उत्तर हिंदुस्थानचा बादशहा जो औरंगजेब त्याला उपमर्दून मराठ्यांचे स्वातंत्र्य व वैभव त्यांना पुन्हा प्राप्त करून दिले. पुढे मोगल व राजपूत या दोघांचाही ऱ्हास झाल्यावर या पुलकेशीच्या देशजनांनीच भारताच्या स्वातंत्र्यासाठी इंग्लिशांशी लढा दिला ( ए हिस्टरी ऑफ सिव्हिलिझेशन ऑफ एन्शंट इंडिया, खंड २ रा, पृ. १५६ ).

राष्ट्रकूट
 चालुक्यांसंबंधीची ही विचारसरणी राष्ट्रकूटांना जशीच्या तशी लागू पडेल. राष्ट्रकूटांविषयी एक विचार वर मांडला आहे. या नावाची अनेक घराणी प्राचीन काळापासून महाराष्ट्रात बसत होती. ही सर्व घराणी परस्पर संबद्ध होती असे नाही. कारण राष्ट्रकूट हे मूळचे कुलनाम नाही. ते अधिकारपदावरून पडलेले नाव आहे. कुळकर्णी, देशपांडे, पोतदार, चिटणीस, देशमुख या अर्वाचीन नावांप्रमाणेच हे नाव आहे. राष्ट्र याचा, प्रदेशाचा, देशाचा जिल्ह्यासारखा विभाग, असा मागे अर्थ होता. त्याचा मुख्य तो राष्ट्रकूट. ग्रामाचा मुख्य तो ग्रामकूट. तसेच नाव होते. यामुळे या नावाची अनेक घराणी येथे झाली. त्यातील मानपुर अथवा साताऱ्यातील माण येथील राष्ट्रकूटांचा निर्देश वर आलाच आहे. याच घराण्याचे पुढे आठव्या शतकात महाराष्ट्रात बलाढ्य साम्राज्य झाले असे म. म. मिराशींनी एके ठिकाणी म्हटले आहे (सं. मुक्तावली, सर २ रा. पृ. ९६ ). पण नंतरच्या एका लेखात मानपूरचे राष्ट्रकूट व विदर्भाचे राष्ट्रकूट यांहून मराठवाड्यात तिसरे एक राष्ट्रकूट घराणे होते व आठव्या शतकात उदयास आले ते हे तिसरे घराणे होय असे मत त्यांनी मांडले आहे (सं. मुक्तावली, सर ५ वा, पृ. १५९). पण ही तीनही घराणी मूळची महाराष्ट्रीय होती याविषयी त्यांना शंका नाही. आठव्या शतकात उदयास आलेले साम्राज्यकर्ते राष्ट्रकूट घराणे त्या वेळी मराठवाड्यात वेरूळ, एलिचपूर येथे होते असे डॉ. अ. स. आळतेकरांचेही मत आहे. पण हे मूळचे लातूर प्रांतातील असून कानडी होते असे ते म्हणतात. इ. स. ६२५ च्या सुमारास ते वेरूळ परिसरात आले व शंभर वर्षांनी तेथूनच त्याने पराक्रमास प्रारंभ केला व पुढे लवकरच साम्राज्य स्थापिले. या चार पिढ्यांच्या काळात हे घराणे महाराष्ट्रीय झाले होते असे त्यांनी म्हटल्याचे मागल्या प्रकरणात सांगितलेच आहे. माझ्या मते हीच विचारसरणी सयुक्तिक आहे.

स्वराज्य महाराष्ट्रात
 डॉ. आळतेकर यांनी आपल्या 'राष्ट्रकूट अँड देअर टाइम्स' या ग्रंथात एक नकाशा दिला आहे. त्यात राष्ट्रकुटांच्या सत्तेखालच्या विस्तीर्ण प्रदेशाचे त्यांनी दोन विभाग करून दाखविले आहेत. त्यातील मध्यवर्ती मोठ्या विभागाला राष्ट्रकूटांच्या राज्याची प्रकृती ( मूळ प्रदेश, नॉर्मल टेरिटरी ) म्हटले असून दुसऱ्या विभागाला त्यांच्या वर्चस्वाखालील प्रदेश ( झोन ऑफ इन्फ्लुएन्स) असे म्हटले आहे. राष्ट्रकूटांच्या राज्याची प्रकृती म्हणून जो विभाग दाखविला आहे त्यात प्रामुख्याने महाराष्ट्राचा समावेश होतो. उत्तरेस नर्मदा-तापी हा दुआब आणि दक्षिणेस कृष्णा- तुंगभद्रा हा दुआब हेही मुलूख प्रकृतीतच येतात. यांच्या पलीकडे उत्तरेस माळवा व बुंदेलखंड हा प्रदेश आणि दक्षिणेस पेन्नार - कावेरी दुआब हे प्रदेश राष्ट्रकूटांच्या साम्राज्यात, वर्चस्वात येतात. या दक्षिण विभागात म्हैसूर, चितळदुर्ग, बंगलोर, कांची, मद्रास, द्वारसमुद्र हा टापू येतो. यावरून आळतेकरांच्या मतेही राष्ट्रकूटांचे स्वराज्य महाराष्ट्रातच होते असे दिसते.
 राष्ट्रकूटांचा जो इतिहास आळतेकरांनी दिला आहे त्यावरून हा विचार जास्त स्पष्ट होतो. गुजराथ, माळवा, ओरिसा, कनोज, आंध्र, पल्लव, पांड्य, चेर, चोल यांच्याप्रमाणेच म्हैसूरच्या गंग राजांशी राष्ट्रकुटांच्या सतत लढाया चालू असत. कृष्ण १ ला, ध्रुव, धारावर्ष, गोविंद ३ रा, अमोघवर्ष या सर्वांनी म्हैसूरवर स्वारी करून गंगांना पराभूत केले आहे. केव्हा केव्हा या लढाया बारा, पंधरा, वीस वर्षेही चालत. कधी कधी गंगराजांना राष्ट्रकूटांनी कैदेत ठेवून आपले राज्यपाल म्हैसूरवर नेमले होते असेही दिसते. पण अन्यत्र राज्य स्थापून महाराष्ट्रावर त्यांनी राज्यपाल नेमून साम्राज्य चालविले असे मात्र अपवादालाही कधी झाले नाही. यावरून राष्ट्रकूटांची भाषा जरी कानडी असली तरी, कर्नाटक ही ते स्वभूमी मानीत नसत असे निश्चित दिसते. त्यांची स्वभूमी महाराष्ट्र ही होती. त्यांचे स्वराज्य महाराष्ट्रात होते व साम्राज्य कर्नाटकावर होते. त्यांच्या कित्येक ताम्रपटांत चालुक्यांच्या सैन्याला त्यांनी कर्नाटक सैन्य म्हणून उपहासाने हिणविलेले आहे. राष्ट्रकूटांचा मूळपुरुष दन्तिदुर्ग याने खानदेश, नाशिक, पुणे, सातारा, कोल्हापूर- म्हणजे बहुतेक सर्व महाराष्ट्र चालुक्य राजा कीर्तिवर्मा याचा पराभव करून जिंकला. या त्याच्या पराक्रमाचे वर्णन करताना या ताम्रपटांत कांची, केरळ, चोल, पांड्य, या देशांचे राजे व सम्राट श्रीहर्ष यांचाही पराभव करणारे, इतरांना अजिंक्य असे कर्नाटक सैन्य दन्तिदुर्गाने जिंकले असे म्हटले आहे. हा श्लोक देऊन म. म. मिराशी म्हणतात, दन्तिदुर्ग स्वतः कर्नाटकीय असता तर त्याने पराजित केलेल्या सैन्याला 'कार्णाटक' असे विशेषण लावले नसते ( सं. मुक्तावली, ५, पृ. १५९ ).

कार्णाटकं बलम्
 राष्ट्रकूटांनी चालुक्यसेनेला ' कार्णाटकं बलं ' म्हणून का हिणविले हे एक मोठे कोडंच आहे. अनेक राष्ट्रकूट सामंत चालुक्यांच्या राज्यात सामंत म्हणून त्यांच्याच सैन्यात लढत असत. मानपूरचे, विदर्भातले व मराठवाड्यातलेही राष्ट्रकूट चालुक्यांच्या सैन्यात पराक्रम करीत होते. दन्तिदुर्ग हा प्रारंभी असाच चालुक्यसेनेत होता असा पंडितांचा तर्क आहे. या सर्व राष्ट्रकूटांना, चालुक्यराजे दर पिढीला कर्नाटकावर स्वाऱ्या करीत होते, वनवासी, गंग, अलूप, बाण यांना जिंकून त्यांना मांडलिक करीत होते, हेही माहीत असलेच पाहिजे. या पराक्रमात ते स्वतःही सहभागी होत असले पाहिजेत. म्हणजे ज्या सेनेला त्यांनी 'कार्णाटक ' म्हणून संबोधिले त्या सेनेत ते स्वतःच जातीने हजर होते. तरी त्यांनी असे का म्हणावे, हे सांगणे कठीण आहे. राष्ट्रकूटांची स्वतःची भाषा कानडी होती, त्यांचे अनेक कोरीव लेखही कानडीत होते. यामुळे हे कोडे जास्तच दुर्गम होऊन बसते. पण प्राचीन इतिहासात अशी कोडी बऱ्याच वेळा पुढे येतात. चितोडचा राजा अंबाप्रसाद क्षत्रिय असून स्वतःला 'क्षत्र- संहारकारी ' म्हणवितो हे असेच कोडे आहे, हे मागील प्रकरणी सांगितलेच आहे. अनेक शब्दांना त्या त्या काळात विशिष्ट अर्थ प्राप्त झालेले असतात, ते पुढे लुप्त होतात आणि मग ते शब्द दुर्गम होऊन बसतात. मराठा हा शब्द आज सर्व महाराष्ट्रीय समाज व शहाण्णव कुळीचे लोक या दोन्ही अर्थी वापरला जातो. वेदकाळी असुर हा शब्द इंद्र, वरुण या देवांनाही लावलेला आढळतो. चाहमान, परमार, या घराण्यांनी आपल्या कोरीव लेखांत स्वतः ब्राह्मण असल्याचे सांगितले आहे. तेव्हा ही कोडी दुर्गम म्हणून सोडून देण्याखेरीज काही गत्यंतर नाही.

कर्मभूमी
 फ्लीट, डॉ. भांडारकर, चिंतामणराव वैद्य, म. म. मिराशी यांच्या मते राष्ट्रकूट है मूळचे महाराष्ट्रातले होत. डॉ. अळतेकर यांना हे मत मान्य नाही. तसे मानल्यास, त्यांची मातृभाषा कानडी होती याचे स्पष्टीकरण करता येत नाही, असे ते म्हणतात. पण हा सगळा वाद हे घराणे मूळचे कोठले होते याबद्दलचा आहे, त्यांची कर्मभूमी कोणती होती, त्यांचे स्वराज्य कोठे होते याबद्दलचा नाही. आणि मूळ स्थान कोणते याला महत्त्व कसे नाही, हे मी वर अनेक ठिकाणी स्पष्ट केलेच आहे. भारतातली अनेक राजघराणी ज्या प्रांतात दीर्घकाळ स्थायिक होऊन राज्य करीत होती त्या प्रांतात ती मूळ अन्य प्रदेशातून आली होती, त्यांचे मूळ स्थान निराळेच होते असा इतिहासच आहे. म्हणून त्यांची कर्मभूमी कोणती, स्वराज्य कोणते या निकषांवरून निर्णय करावा असे मला वाटते. त्या दृष्टीने पाहता राष्ट्रकूट हे चालुक्यांप्रमाणेच महराष्ट्रीय ठरतात असे दिसेल.
 चालुक्यांप्रमाणेच राष्ट्रकूटांचे अनेक कोरीव लेख महाराष्ट्रातच सापडतात. वेरुळ, वर्धा, दिंडोरी, सांगली, मयूरखंडी (नाशिक जिल्हा ), संजाना ( ठाणे ), तळेगाव ढमढेरे, थांदक (चांदा जिल्हा ), पिंपेरी ( खानदेश ), तोरखेडे (खानदेश), अलास ( कुरुंदवाड ), खारेपाटण सामनगड ( कोल्हापूर ), जवरखेडा ( खानदेश ), मानोर (ठाणे) या ताम्रपटांवरून राष्ट्रकूटांची महाराष्ट्र ही कर्मभूमी व तशीच दानभूमीही होती हे दिसून येईल.

राज्यश्री केव्हा लोपली ?
 चालुक्य व राष्ट्रकूट यांच्या सत्ता महाराष्ट्राशी कशा अविभाज्यपणे निगडित होत्या, हे आणखी एका गोष्टीवरून दिसून येईल. चालुक्यसत्तेचा अस्त इ. स. ७५० च्या सुमारास झाला व राष्ट्रकूट सत्तेचा अस्त इ. स. ९७३ साली झाला. या दोन्ही सत्तांचा अस्त झाला हे केव्हा ठरले ? महाराष्ट्रातून त्यांच्या सत्ता नष्ट झाल्या तेव्हा. या दोन्ही घराण्यांनी वर सांगितल्याप्रमाणे कर्नाटक, गुजराथ, माळवा, कोसल, आंध्र, तामिळनाड, चोल, पांड्य, चेर हे देश अनेक वेळा जिंकले होते. तेथील राजांना कधी मांडलिक बनविले होते, कधी आपल्या इतर सामंतांना नेमिले होते. पण जसे हे देश त्यांनी अनेक वेळा जिंकले तसेच अनेक वेळा त्यांची सत्ता झुगारून ते देश स्वतंत्रही झाले होते. तसे नसते तर दर पिढीला त्यांच्यावर स्वारी करण्याचे यांना कारणच पडले नसते. पण त्या प्रदेशातील सत्ता नष्ट झाली तरी या चालुक्यांची सत्ता नष्ट झाली असे कोणीच म्हटले नाही. कोणालाही तसे वाटले नाही. महाराष्ट्रातली त्यांची सत्ता गेली तेव्हाच या राजवंशाचा शेवट झाला, असे ठरले. तोपर्यंत नाही. याउलट इतर प्रदेशांत यांच्या इतर शाखांनी स्थापिलेल्या सत्ता टिकून राहिल्या तरी यांची सत्ता टिकली असेही कोणी म्हटले नाही. चालुक्य सम्राट दुसरा पुलकेशी याने आपला भाऊ विष्णुवर्धन झाला आंध्र प्रांतात आपला सामंत म्हणून नेमले होते. पण थोड्याच अवधीत त्याने बदामीचे वर्चस्व झुगारून दिले व तो स्वतंत्र झाला. आंध्रातील वेंगीचे हे पूर्व- चालुक्य घराणे इ.स. १०८० पर्यंत सत्ताधीश होते. पण त्यामुळे बदामीच्या चालुक्यांची राजसत्ता टिकली असे ठरले नाही. महाराष्ट्रातली त्यांची सत्ता गेली त्याबरोबर त्यांची राज्यश्री लोपली. कारण ते महाराष्ट्राचे राजे होते. इतरत्र त्यांचे स्वराज्य असते तर, महाराष्ट्रात त्यांचे साम्राज्य गेले तरी, त्यांच्या सत्तेचा लोप झाला नसता. पण महाराष्ट्रात त्यांचे स्वराज्य होते, साम्राज्य कधीच नव्हते. त्यामुळे ते लुप्त होताच त्यांचा अस्त झाला.

महाराणा फ्रेडरिक
 बदामीच्या चालुक्यांची भाषा कानडी असताना त्यांना महाराष्ट्रीय म्हणणे पुष्कळांना विचित्र वाटते. पण इतिहासात असे कधी कधी घडत असते हे त्यांनी ध्यानी घ्यावे. प्रशियाचा महाराणा फ्रेडरिक ( १७१२-८६ ) याच्या जर्मनत्वाबद्दल कोणी शंका घेईल असे वाटत नाही. प्रशिया हा प्रदेश संघटित करून त्याने एक बलाढ्य जर्मन देश प्रस्थापित केला आणि अखिल जर्मनीच्या ऐक्याचा व उत्कर्षाचा पाया घातला. पण त्याला जर्मन भाषेचा तिटकारा होता. तो स्वतः फ्रेंच भाषेतून बोले. त्याने आपले ग्रंथ फ्रेंचमध्येच लिहिले, आपल्या दरबारी फ्रेंच ग्रंथकारांना तो आदराने बोलावी, स्वत: फ्रेंच ग्रंथकार व्हावे ही त्याची आकांक्षा होती. फ्रेंच साहित्य, फ्रेंच पोशाख, फ्रेंच रीतिरिवाज यावर त्याची भक्ती होती. जर्मन जीवनरीतीची तो उघडपणे चेष्टा करी. त्याची बहीण विल्हेमा हिची अशीच वृत्ती होती. त्या काळी जर्मन सुशिक्षित लोक आपसातही फ्रेंच बोलत व फ्रेंच संस्कृतीचे अनुकरण करण्यात धन्यता मानीत. पण असे असूनही जर्मन लोकांना संघटित करून, त्यांचे सामर्थ्य वृद्धिंगत करून, त्यांना जगात फ्रेडरिक यानेच प्रथम प्रतिष्ठा मिळवून दिली, याबद्दल जर्मनीत कोणालाही शंका नाही. लेसिंग या जर्मन साहित्यशास्त्रज्ञाने पुढे जर्मन भाषेचा अभिमान लोकांत जागृत केला. पण फ्रेडरिकने जी स्वत्वजागृती केली तिच्यामुळेच लेसिंगला ते शक्य झाले असे इतिहासपंडित सांगतात ( १ एनसायक्लोपीडिया ब्रिटानिका, २. 'फ्रॉम दीज रूट्स् ' - मेरी कोलम, पृ. ३२ ) . हाच न्याय चालुक्यांना लावणे युक्त होईल. सत्याश्रय पुलकेशी हा मराठ्यांचा, महाराष्ट्राचा राजा होता, त्यांना त्याने पराक्रमी बनविले हे ह्युएनत्संग व रमेशचंद्र दत्त यांचे म्हणजे आपण ध्यानी घ्यावे.

विजयनगर कोणाचे ?
 विजयनगरच्या संगम, सालुव, तुलुव व अरविद्व या चार सम्राट घराण्यांची भाषाविषयक वृत्ती पाहणे येथे उद्बोधक होईल. विजयनगरच्या साम्राज्याचे संस्थापक हरिहर व बुक्क हे मूळ आंध्रप्रदेशातील वरंगळच्या राज्यात सरदार होते, हे बहुतेक पंडितांना मान्य आहे. सूर्यनारायणराव, रंगाचारी, वेंकटरमणय्या यांच्या मते हे सरदार आंध्र- प्रांतीय, म्हणूनच तेलगू भाषिक होते. सालुव हे दुसरे घराणे. त्यांचे मूळपीठ निश्चित नाही. पण या घराण्यातील सर्व राजांचा तेलगूवर लोभ होता. ती भाषा त्यांना प्रिय होती. पुढले तिसरे घराणे तुलुव हे होय. हे मूळचे दक्षिण कर्नाटकातील तुलुवनाडू परगण्यातील घराणे होय. पण त्यांनी तामिळनाडमध्ये जाऊन अर्काटच्या परिसरात आपले राज्य स्थापिले होते. तेथून ते विजयनगरला येऊन सम्राटपदी आरूढ झाले. पण त्यांचा सर्व ओढा तेलगू भाषेकडे होता. या घराण्यातील अत्यंत थोर सम्राट कृष्णदेवराय हे तर निश्चितच तेलगू भाषिक होते. 'अमुक्तमाल्यदा' हा त्यांचा ग्रंथ तेलगू भाषेतच आहे. अष्ट दिग्गज म्हणून प्रसिद्ध असलेले त्याच्या राजसभेतील आठ कवी सर्व तेलगू होते. प्रसिद्ध भोजराजा हा माळव्यातला, म्हणून तो मालव भोज होय. कृष्णदेवराय तेलगूचा पुरस्कार करीत म्हणून त्यांना 'आंध्रभोज' म्हणत. सालुव नरसिंहापासून कृष्णदेवरायापर्यंत विजयनगरमध्ये तेलगूचे सुवर्णयुगच होते असे म्हणतात ( डॉ. वेंकटरमणय्या, हिस्टरी अँड कल्चर ऑफ दि इंडियन पीपल, खंड ६ वा, प्रकरण १२ वे ). के. ईश्वरदत्त यांच्या मते प्रारंभापासून तीनशे वर्षे विजयनगरच्या दरबारात तेलगूचेच वर्चस्व होते. आणि ते केवळ भाषेचेच नव्हे, तर रीति- रिवाजांचेही (विजयनगर- स्मृतिग्रंथ, पृ. ५४ ). विजयनगरला तेलगू भाषा व संस्कृती यांचे असे वर्चस्व होते हे डॉ. बी. ए. सालेटोर यांनाही मान्य आहे ( सोशल अँड पोलिटिकल लाइफ इन् विजयनगर एंपायर, खंड १ ला, प्रस्तावना, पृ. २३, २४ ). पण असे असले तरी विजयनगरचे वैभव हे कर्नाटकीय वैभव आहे असे कन्नडिग मानतात, आणि माझ्या मते ते सयुक्तिकच आहे. ' विजयनगर दरबारात तेलगूचे वर्चस्व होते ' असे म्हणणारांनीही ' कन्नडांच्या दरबारांत ते वर्चस्व होते ' असे म्हटले आहे, तेही याच जाणिवेने होय. वर सांगितलेल्या सर्व घराण्यांनी कर्नाटक हीच आपली कर्मभूमी मानली होती. तेव्हा ती कर्नाटकीय होत यात शंका नाही. डॉ. सालेटोर यांनी हरिहर व बुक्क हे मूळचे कन्नड होते असे ठरविण्याचा अट्टाहासाने प्रयत्न केला आहे. पण त्याचे काही प्रयोजन नाही, फलही नाही. त्यांनी कर्नाटक ही स्वभूमी मानली, कर्मभूमी मानली हे पुरेसे आहे. संगम, अरविद्व ही घराणी मूळ तेलगू असली तरी ती राजघराणी कर्नाटकीय होत यात शंका नाही.


उत्तर चालुक्य
 बदामीचे चालुक्य, राष्ट्रकूट यांचा याच दृष्टीने विचार केला पाहिजे. त्यांची भाषा कानडी होती; पण कर्नाटक हा त्यांनी कधीही आपला मानला नाही. गंगवाडी, वनवासी, नोळंबवाडी, वाणवाडी या कर्नाटकातील राज्यांशी त्यांचे पिढ्यान् पिढ्या वैरच होते. तेव्हा गुजराथ, मावळा, कोसल, कांची या प्रदेशांप्रमाणेच ते कर्नाटकही परप्रांत मानीत होते, तो त्यांच्या स्वराज्यात नव्हता, है उघड आहे. राष्ट्रकूटांच्या मागून सत्ताधीश झालेले कल्याणीचे चालुक्य यांचीही हीच दृष्टी होती. तैलप २ रा हा या चालुक्यांच्या सत्तेचा संस्थापक. सत्ताधीश होताच त्याची पहिली लढाई झाली ती गंग, वनवासी, नोळंबवाडी यांचा राजा पांचालदेव याशी. कारण राष्ट्रकूटवंशीय राजा इन्द्र याला त्याने आश्रय दिला होता. या लढाईत पांचालदेव प्राणास मुकला. तेथून पुढे सत्याश्रय, सोमेश्वर पहिला, सोमेश्वर दुसरा, विक्रमादित्य यांच्या कारकीर्दीत गंग, वनवासी यांशी एकेकदा तरी चालुक्यांची लढाई झालेलीच आहे. आणि त्या राजांना मांडलिकत्व मान्य करावे लागले आहे. दहाव्या शतकात हळेबीड-द्वारसमुद्र येथे होयसळ यादवांचा उदय झाला. हे देवगिरीच्या यादवांचेच भाईबंद होते. पण प्रारंभापासूनच चालुक्यांच्या त्यांच्याशी लढाया सुरू झाल्या. विक्रमादित्य, सोमेश्वर ३ रा, जगदेक मल्ल यांच्या कारकीर्दीत हळेबीडचे होयसळ मांडलिक म्हणून आपल्या सेनेनिशी त्यांच्या साह्याला आले असल्याचे इतिहास सांगतो. या कल्याणीच्या चालुक्यांचे कोरीव लेख, त्यांच्या सत्तेचे उदयास्त यांवरून बदामीचे चालुक्य व राष्ट्रकूट यांच्याप्रमाणेच हेही घराणे महाराष्ट्रीय होते असे दिसून येईल.

देवगिरीचे यादव
 कल्याणीच्या चालुक्यांनंतर देवगिरीच्या यादवांची सत्ता महाराष्ट्रावर प्रस्थापित झाली. त्यांच्या महाराष्ट्रीयत्वाबद्दल कसलाच वाद नाही. पहिला यादव सम्राट भिल्लम याने ११८७ साली साम्राज्याची स्थापना केली. त्याच्या पुढल्याच वर्षी मुकुन्दराजाचा 'विवेकसिंधू' हा मराठीतला आणि अभिमान धरणारा पहिला ग्रंथ अवतरला. यादवांनी मराठीला आश्रय तर दिलाच होता. पण मराठीचे व महाराष्ट्राचे निःसीम अभिमानी जे महानुभावपंथाचे संस्थापक चक्रधर त्यांचे शिष्यत्वही त्यांनी पत्करले होते. मुकुन्दराज, चक्रधर व ज्ञानेश्वर हे मराठी साहित्याचे आद्यपुरुष त्यांच्याच कारकीर्दीत उदयास आले आणि यादवांनी राजसत्तेने व त्यांनी आपल्या वाणीने महाराष्ट्राच्या सीमा व त्याची अस्मिता यांना चिरस्थायी रूप देऊन टाकले. यादवांचे लेख मराठीप्रमाणे कानडीतही आहेत. पण त्यांची राजभाषा मराठी होती. आणि त्यांची कर्मभूमी चालुक्य राष्ट्रकूटांप्रमाणे महाराष्ट्र हीच होती. चोल, पांड्य, कलिंग, तेलंगणाप्रमाणेच कर्नाटकावरही यादवांचे साम्राज्य होते. येथे एक गोष्ट लक्षणीय आहे. म्हैसूर प्रांतातील द्वारसमुद्र - हळेबीड येथील होयसळ यादव हे राजघराणे म्हणजे यादवांचीच एक शाखा होती. पण त्यांनी आपली कर्मभूमी कर्नाटक ही मानली आणि भिल्लम यादवाच्या वंशजांनी महाराष्ट्राला स्वराज्य मानले. यामुळे एकवंशीय असूनही ते कर्नाटकी झाले व हे मराठी झाले. होयसळ यादव वीर बल्लाळ व देवगिरी यादव भिल्लम यांचा उदय साधारण एकाच वेळी झाला. दोघेही एकवंशीय पण दोघांमध्ये अखंड संग्राम चालू होते. त्यात महाराष्ट्रात भिल्लमाची सत्ता दृढ झाली. आणि कर्नाटकातील द्वारसमुद्र येथे वीर बल्लाळाची झाली. आणि त्यामुळे त्यांचे राष्ट्रीयत्व अगदी भिन्न होऊन गेले.

सहा राजधान्या
 या राजघराण्यांचा स्वरूपनिश्चय करताना त्यांच्या राजधान्या कोठे होत्या या विचारालाही महत्त्व आहे. म्हणून त्या दृष्टीने विवेचन करून ही चर्चा संपवू. सात- वाहनांपासून यादवांपर्यंतच्या सहा राजघराण्यांपैकी सातवाहन यांची पैठण, वाकाटकांची नंदिवर्धन व यादवांची देवगिरी अशा तीन राजधान्या महाराष्ट्रातच होत्या. राष्ट्रकूटांची राजधानी प्रथम वेरूळच्या आसपास होती; राज्यस्थापनेनंतर सुमारे पाऊणशे वर्षांनी अमोघवर्ष पहिला याने ती मान्यखेटला नेली. हे मान्यखेट आज कानडी मुलखात असले तरी त्या वेळी मराठी भाषिक होते हे अनेक पुराव्यांवरून आता सिद्ध झाले आहे. पुष्पदंत हा अपभ्रंश महाकवी. तो राष्ट्रकूट राजा कृष्ण तिसरा याचा प्रधान भरत याच्या आश्रयाला होता. हा भरत 'प्राकृतकविकाव्यरसावलुब्ध' असा होता. पुष्पदंताचे काव्य जे महापुराण त्याची भाषा जवळजवळ मराठीच आहे, हे श्री. ग. वा. तगारे यांनी सप्रमाण दाखवून दिले आहे ( सह्याद्री, एप्रिल १९४१ ) जसहर चरिऊ, णायकुमार चरिऊ हे आपले इतर ग्रंथ पुष्पदंताने मान्यखेटलाच लिहिले. राष्ट्रकुट राजे संस्कृत व कानडीप्रमाणेच महाराष्ट्री अपभ्रंशालाही उत्तेजन देत असत. पुष्पदंतासारखे कवी महाराष्ट्री अपभ्रंशात रचना करीत, कारण ती त्या वेळी लोक- भाषा - देसी भास होती हे मागे सांगितलेच आहे. तेव्हा मान्यखेट नगरी त्या काळी महाराष्ट्रातच होती असे म्हणणेच सयुक्तिक ठरेल. मान्यखेटचे आजचे नाव मालखेड असे आहे हेही आपण ध्यानी घ्यावे.
 कल्याणीचे चालुक्य यांची मान्यखेट हीच प्रारंभी राजधानी होती. बऱ्याच काळानंतर त्यांनी ती पूर्वेस कल्याणीला नेली. ही नगरी जुन्या निजामी राज्यातील कलबुर्गा शहराजवळ होती. आज ते एक तालुक्याचे लहानसे गाव आहे. त्या गावची आजची भाषासुद्धा मराठी आहे. आज ते गाव कर्नाटक व महाराष्ट्र यांच्या सीमेवर आहे. तेव्हा त्या मागल्या काळी ते महाराष्ट्रात असणे पूर्ण शक्य आहे.
 राहता राहिली एक राजधानी. ती म्हणजे बदामी ह्युएनत्संगाने ज्याला मराठ्यांचा राजा असे म्हटले त्या सत्याश्रय पुलकेशीची ही राजधानी. त्याची दुसरी राजधानी नाशिक किंवा वेरूळ ही असावी असे संशोधकांचे मत असल्याचे वर सांगितलेच आहे. पण ती दुय्यम होय. मुख्य राजधानी बदामी हीच होती. ही नगरी आजच्या विजापूर जिल्ह्यात म्हणजे कर्नाटकात जाहे. चालुक्य हे कानडी होते असे म्हणणारा पक्ष हे एक प्रमाण म्हणून देतो. आणि वर जी विचारसरणी मांडली आहे तिच्या अभावी त्या प्रमाणाला महत्त्व आलेही असते. पण आज गोवा, बेळगाव, कारवार यांबद्दल जे वाद चालू आहेत त्यांवरून प्रदेशांच्या सीमारेषा आजही किती अनिश्रित असतात ते ध्यानी येईल. पंजाब व बंगाल यांची फाळणी होऊन इकडचे अनेक जिल्हे तिकडे झाले व पूर्व पंजाबची पुन्हा फाळणी होऊन हरयाना प्रदेश निराळा झाला आणि आज राजधानी चंदीगड हिच्याविषयी वाद निर्माण झाला आहे. या घटना पाहता बदामीचा आजचा भूगोल त्या काळी ती कर्नाटकातच होती हे निश्चित ठरविण्यास पुरा पडेल असे नाही.
 महाराष्ट्राच्या सांस्कृतिक वैभवाचा विचार करताना प्रथम येथील राजशासनांचा विचार करणे अवश्य होते. कारण स्वकीय राजसत्तेवाचून संस्कृतीचा उत्कर्ष होत नाही. म्हणून गेल्या प्रकरणात सातवाहनांचा व या प्रकरणात वाकाटक ते यादव या पाच राजघराण्यांचा विचार आपण केला. इतिहाससंशोधनाच्या प्रारंभी या काळात इतिहाससाधने फारशी उपलब्ध नव्हती. त्यामुळे या सहा राजघराण्यांच्या विषयी अनेक प्रकारचे वाद निर्माण झाले होते. आणि ही सर्व घराणी कोणाच्या ना कोणाच्या मते महाराष्ट्राला परकी ठरली होती. पण गेल्या तीसचाळीस वर्षांत नाणी, शिलालेख, ताम्रपट या साधनांची विपुल उपलब्धी झाली व संशोधनाला नवी दिशा लागली. ते सर्व संशोधन व इतिहासपंडितांनी त्यासंबंधी केलेली चर्चा ही ध्यानात घेऊन या घराण्यांकडे मी पाहू लागलो तेव्हा ती सर्व सहाही घराणी महाराष्ट्रीय आहेत असा माझ्या मनाशी निर्णय झाला. त्या निर्णयामागे कोणती विचारसरणी आहे त्याचेच विवेचन या प्रकरणात केले आहे. एखादे घगणे मूळ कोठून आले हा खरा निकष नसून ते स्वराज्य कोणत्या भूमीला मानते, त्याने कर्मभूमी कोणती निवडली, स्वजन कोणाला म्हटले, पराक्रम कोणासांगाती केला हा माझ्या मते खरा निकष होय. विचारवंतांना, इतिहासवेत्त्यांना हा निकष मान्य होईल असे मला वाटते. तसे झाल्यास ही सर्व घराणी महाराष्ट्रीय होती हा त्याअन्वये निघणारा निष्कर्षही त्यांना ग्राह्य वाटेल अशी आशा व्यक्त करून ही लांबलेली चर्चा संपवितो.
 
 

आद्य धनगर सम्राट " मौर्यकुलभूषण चंद्रगुप्त मौर्य"

या चंद्रगुप्त मौर्याविषयी एक गोष्ट सांगितली जाते, त्या गोष्टीचा प्रत्येक भारतीयाने अभिमान बाळगला पाहिजे. तर ती अभिमानास्पद गोष्ट ही की, "हिंदुकुश पर्वताला ग्रीक लोक 'हिंदी काकेशस' असे म्हणत. हा पर्वत आपल्या राज्याची उत्तर मर्यादा असावी म्हणून सोळाव्या आणि सतराव्या शतकात मोंगल बादशहांनी आणि त्यापुढे इंग्रजांनी खूप धडपड केली. पण ह्यांपैकी कोणालाही जे साधले नाही ते बावीसशे वर्षांपूर्वी एका भारतीय धनगर राजाने साधले. तो म्हणजे मौर्यकुलभूषण चंद्रगुप्त "

चंद्रगुप्ताच्या जन्मासंबंधी अनेक आख्यायिका आहेत आणि खात्रीलायक माहितीही उपलब्ध नाहीये. अनेक तर्क चंद्रगुप्ताच्या जन्माबाबत लढविले गेले आहेत. दंतकथांना आपले संशोधक पुरावा म्हणून मानत नाहीत. पण प्रत्येक दंतकथेच्या मुळाशी सत्याचा अंश दडलेलाच असतो.चंद्रगुप्त चा पशुपालक / मेश्पालक - धनगर समाजात जन्म झाला होता यात शंका उरत नाही 

 शिक्षण कोटिल्याच्या देखरेख्रीत झाले. सैनिकी शिक्षणात तो तरबेज झाला. राजनीतीचे ही थडे गिरविले एक चांगला सेनानी कुशल प्रशासक, राजनितिज्ञम्प्; अशा विविध पैलुनी त्याचे व्याक्तिमत्व विकसित झाले. या व्यक्तिमत्वापूढे तत्कालीन नंद साम्राज्य हे एक आव्हान होते. लोक या साम्राज्याच्या जुलुमाला कंटाळले होते. धनानंदाच्या धनलोभाने अनेकांना नागवले होते. या धनानंदाचे राज्य उलथून टाकण्यासाठी चंद्रगुप्ताने प्रचंड सैन्याची जमवाजमव केली. चाणक्याने ही लोकमानसाचा कानोसा घेत घेत लोकमत तयार केले. लोकंाचे मनौधैर्य वाढले. आजूबाजूच्या अनेक टोळी राज्यांच्े चंद्रगुप्ताला सहकार्य मिळाले चंद्रगुप्त आणि चाणक्यानी सैन्यभरतीसाठी भाषांतरांवरूनरमंती केली. राजा पर्वतकाशी तह केला शक, यवन, किरात, कंबोज, पारसिक, मल्लीक, असे अनेक प्रकारचे लोक मौर्याच्या- सैन्यात दाखल झाले. इ.स. पूर्व ३२४ मध्ये चंद्रगुप्ताने धनानंदाचा वध करुन मौर्य साम्राज्याची स्थापना केली. पाटलीपुत्र मौर्याच्या हाती आले.

चंद्रगुप्ताचा राज्यविस्तार
 मगधाची राजधानी तसब्यात घेऊन मौर्य साम्राज्याची स्थापना केल्यानंतर चंद्रगुप्ताने साम्राज्यविस्ताराचे कार्य हाती घेतले अनेक जनपदे, गणराज्ये त्याने जिंकलीी. आपल्या सहालाख सैन्यासह त्याने आजूबाजूच्या प्रदेशात आपले निर्विवाद वर्चस्व प्रस्थापित केले. जवळजवळ सारा भारत देश त्याच प्रभुत्वाखली आला. म्हैसूरपर्यत त्याचे राज्य विस्तारले होते. पर्शियापासून म्हैसूरपर्यत पसरलेले एक प्रचंड साम्राज्य चंद्रगुप्ताने आपल्या पराक्रमाने निर्माण केले एवढया विस्तृत प्रदेशावर राज्य करणारास चंद्रगुप्त हा भारतातील पहिला सम्राट. मौर्य साम्राज्याच रूपाने भारतातील पहिली प्रबळ अशी एकछत्री सत्ता स्थापन झाली.

ग्रीकांचा पराभव
 चंद्रगुप्त मगधच्या सत्तेवर येण्याअगोदर पासून पर्शियनांची ग्रीकांची आक्रमण भारतावर होत होती. सिकंदरची स्वारी म्हणजे ग्रीक सैन्याचा प्रचंड झंझावात होता. पोरसाने झेलमच्या लढाईत शौर्याची पराकाष्ठा केली तरी त्याला पराभव पत्कारावा लागला. सिकंदर नंतर सेल्यूकस निकेटरने पुन्हा एकदा भारतावर आक्रमण केले. या आक्रमणाला सम्राट चंद्रगुप्त मौर्याने आपल्या प्रचंड सैन्यानिशी तोंड दिले. त्याला पराभूत केले. अरकोसिया, काबूल, कंधार, गॅडरोसिया बलुचिस्तान हा सारा प्रदेश ग्रीकांकडून चंद्रगुप्ताने जिंकून घेतला. सेल्यूकस निकेटरच्या मुलीशी त्याने विवाह केला. ग्रीक भारत संबंध प्रस्थापित झाले. ग्रीक राणीची मौर्याची नाणही उपलब्ध होतात. त्यावरुन हे स्पष्ट होते की चंुद्रगुप्ताने ग्रीक युवतीशी लग्न केले होते. सेल्यूकस निकेटरचा प्रतिनिधी म्हणूनच मेगॅस्थनीस चंद्रगुप्ताच्या दरबारी राहिला होता. अशा रीतीने चंद्रगुप्ताने ग्रीकांना पराभूत करुन मौर्याचा प्रभाव प्रस्थापिला.

साधारण इसवी सनापूर्वी ३०३ या वर्षी अलेक्झांडरच्या एका सरदाराने - सेल्युकस निकेटरने -चंद्रगुप्ताच्या साम्राज्यावर स्वारी केली. पण चंद्रगुप्ताच्या बलाढ्य सैन्यापुढे त्याचा सपशेल पराजय झाला. व त्याला चंद्रगुप्ताशी तह करावा लागला. या तहामुळे सेल्युकसला काबूल, कंदहार व हिरात ही शहरे ज्या प्रांतांच्या राजधान्या होत्या ते प्रांत सोडावे लागले. अशा तर्‍हेने चंद्रगुप्ताने आपले साम्राज्य हिंदुकुश पर्वतापर्यंत नेऊन भिडवले. या तहामुळे चंद्रगुप्ताला फार मोठा प्रदेश मिळाला. त्याबदल्यात चंद्रगुप्ताने सिकंदराच्या या सरदाराला केवळ पाचशे हत्ती दिले. यावरुन हा तह करण्यामधे चंद्रगुप्ताची मुत्सद्देगिरी दिसून येते. सेल्युकस निकेटर हा सिकंदराच्या मृत्यूनंतर बंडखोरी करुन जास्त भूभाग मिळवणार्‍या सरदारांपैकी एक होता. तो शूर असल्याने त्याने बराच प्रदेश बळकावला होता. सिकंदराचा मृत्यू इ.स.पूर्व ३२३ च्या जून महिन्यात झाला. ऑगस्टमधे ही बातमी हिंदुस्थानात पोहोचली व नोव्हेंबरच्या सुमारास चंद्रगुप्ताने पहाडी लोकांचे सैन्य उभारुन ग्रीकांनी बळकावलेले प्रदेश मुक्त केले. इ.स.पूर्व ३२२ च्या आरंभीच सर्व भारतीय भूभाग चंद्रगुप्ताने ग्रीकांच्या सत्तेपासून मुक्त केले. चंद्रगुप्त तेव्हा जेमतेम २५-२६ वर्षांचा असेल. इ.स.पूर्व ३०५ च्या सुमारास सेल्युकस निकेटरने सिंधू नदी उतरुन आर्यावर्तावर स्वारी केली.
चंद्रगुप्ताने सहजपणे त्याचा पराभव करुन हाकून लावले. व झालेल्या तहामुळे सेल्युकसने आपली मुलगी हेलन हिचा चंद्रगुप्ताशी विवाह करुन दिला व त्याच्याशी सख्यत्व केले.
अशा रितीने चंद्रगुप्ताने मगध साम्राज्याचा विस्तार केला व राष्ट्र एकसंध करण्याची कल्पना वास्तवात आणली. 

चंद्रगुप्ताची प्रशासन व्यवस्था
एवढया प्रचंड साम्राज्याची व्यवस्था लावण्यासाठी चंद्रगुप्ताने सुव्यवस्थित अशी प्रशासन -प्रणाली अंमलात आणली होती. त्याचे राज्य अनेक प्रांतांमध्ये विभागले होते. प्रांतांची विभागणी विश मध्ये केलेली असे. विशाची विभागणी ग्रामामध्ये होई. ग्राम लहान प्रशासकीय घटक विश हा जिल्हास्तरीय घटक होय. अग्रनोमी हा विशमधला प्रमुख अधिकारी त्याशिवाय जानपद व गोपभागात ही अनेक अधिकारी असत. प्रातीय प्रशासनाप्रमाणेच चंद्रगुप्ताचे केंद्रीय प्रशासनही अत्यंत नियंत्रित होते. केंद्रीय प्रशासनातील सर्व सज्ञ्ल्त्;ाा सम्राटाच्या हाती एकवटलेली होती. राजाच्या हाताखाली त्याचे मंत्रिमंडळ असे. अनेक अधिकारी असत. कारभार अनेक खात्यात विभागलेला असे. प्रशासनात प्रामुख्याने लष्कर, हेर, न्याय, पाटबंधारे, इत्यादी महत्वाची खाती असत. हेरांचे जाळे सर्व साम्राज्यभर पसरलेले होते. दक्ष अशा हेरखात्यामुळेच साम्राज्य भक्कमपणे उभे होते. परराष्ट्रखातेही अत्यंत दक्ष होते. साम, दाम, दंड, भेद अशा नीतीचा वापर करुन शेतूराष्ट्राला नामोहरण करण्याचे धोरण हे मौर्य प्रशासनाचे मूळ सूत्र होते.
चंद्रगुप्ताच्या प्रशासन व्यवस्थेचे वैशिष्टये म्हणून नगर प्रशासनाचा उल्लेख करावा लागेल. पाटलीपुत्र या राजधानी शहराची व्यवस्था ३० जणाच्या प्रतिनिधीमंडळांमार्फ़त ठेवली जात असे. या ३० प्रतिनिधीमधून सहा समित्या निवडल्या जात. प्रत्येक समितीत ५ प्रतिनिधी असत. करवसुली बाजार नियमन, औद्योगिक, परकीय प्रवासी, उत्पादन आणि जन्ममृत्यू नोंद अशी कामे या समितीकडे असत.
साधारणत: अशाच स्वरुपात लष्करी प्रशासनाचेही व्यवस्थापन होते. हे व्यवस्थापन ही ३० जणांच्या व्यवस्थापन मंडळाकडे असे. हे मंडळही ६ समित्यामध्ये विभागलेले असे. नावीकदळ पायदळ, घोडदळ, रथदळ, हत्तीदळ, दळणवळण, अशी वेगवेगळी कामे हया समित्या पहात असत.
 
 http://vithal-khot.blogspot.com/2011/12/dhangar-history.html
 
 


सुभेदार मल्हारराव होळकर




सुभेदार मल्हारराव होळकर

दुभती जनावरे आणि मेंढी पालन करणा-या भटक्या धनगर समजातील खंडूजी वीरकर चौगुला यांच्या घरात मुलगा जन्माला आला आणि त्याचे नामकरण मल्हार करण्यात आले. त्यावेळी धनगरी तांडा होळ मुक्कामी होता, "मुलाचे पाय पाळण्यात दिसतात" या उक्तीप्रमाणेच छोटा मल्हार तांड्यातील मुलांबरोबर खेळताना आपले गुण दाखवू लागला.मल्हार लहान असतानाच खंडूजीचा मृत्यू झाला आणि मल्हार व त्याच्या आईवर भाऊबंदांचा जाच वाढू लागला, म्हणून दोघांनी सुलतानपूर परगण्यातील तळोदे येथे भोजराज बारगळ मामाकडे आश्रय घेतला. होळ गावातील वास्तव्य संपले परंतु होळचे नाव त्यांच्यामागे चिकटले ते कायमचेच.
दाभाड्यांचा एक सरदार कंठाजी कदमबांडे यांच्या पेंढारी टोळीतून आपली कारकीर्द सुरु केली. शिपाईगिरी करीत असताना तरुण बाजीराव पेशवे यांच्याबरोबर त्यांची खास मैत्री जुळून आली आणि आपल्या पराक्रमाच्या जोरावर इसवी सन १७२९ च्या सुमारास माळवा प्रांताची सुभेदारी मिळवली. मध्यंतरीच्या कालावधीमध्ये भोजराज मामाची मुलगी गौतमी बरोबर मल्हाररावचा विवाह संपन्न झाला आणि पुत्र झाला त्याचे नाव खंडेराव ठेवण्यात आले. जेजुरीचा खंडेरायाच्या कृपादृष्टीमुळेच आपली प्रगती झाली असल्याची मल्हारबांना धारणा होती, त्यामुळेच त्यांनी सुभेदारी मिळाल्याबरोबर जेजुरीला कुलोपाध्ये नेमले. मंदिराचे बांधकाम करण्याचा घाट घातला.
उत्तरोत्तर मल्हारबाची प्रगती होत होती, राणोजी शिंदे आणि उदाजी पवार यांच्यासोबत माळव्याची सुभेदारी समर्थपणे सांभाळीत होते. गनिमीकावा आणि मुत्सदेगीरीच्या जोरावर, उत्तर हिंदुस्थानातील राजकारणामध्ये मल्हाररावांचा मोठा दबदबा होता, मल्हार आया.. मल्हार आया... गर्जनेने शत्रूची दाणादाण उडत असे. इसवी सन १७३३ मध्ये चौंडीच्या माणकोजी शिंदे यांची कन्या अहिल्याबरोबर पुत्र खंडेरावचा विवाह लावून देण्यात आला. खंडेराव विलासी वृत्तीचा असल्याने मल्हारबांनी अहिल्येवर पुत्रवत प्रेम केले आणि तिच्यावर जबाबदारी सोपविली. १७ मार्च १७५४ मध्ये अघटीत घटना घडली, कुंभेरीच्या किल्ल्याला वेढा दिला असताना भर दुपारी बेधुंद अवस्थेत खंडेराव छावणीतून बाहेर पडला आणि किल्ल्यावरून सोडलेल्या तोफेचा गोळा लागून मृत्यूमुखी पडला. अहिल्याबाई सती जाण्यास निघाली असताना मल्हारबांना तिचा विचार बदलण्यात यश आले, परंतु बाकी आकराजणी सती गेल्या.

पुत्रवियोगाचे दुःख पचवून मल्हारबांनी मोहिमा उघडल्या, इसवी सन १७५८ मध्ये मराठ्यांनी अटकेपार झेंडे फडकाविले. याच सुमारास जेजुरगडावरील नगारखाण्याचे बांधकाम पूर्ण करून घेतले. रांगडे आणि कठोर व्यक्तिमत्व असलेले मल्हारराव, कधी कधी इतके मवाळ होत कि शरण आलेल्या शत्रूला आपल्या बरोबरीने वागवत. त्यांच्या याच स्वभावाने घात झाला आणि मोगल सरदार नजीबाने केलेल्या चुका अनेकदा पोटात घातल्या आणि त्याला मोकळा सोडून दिले. पुढे याच नजीबाने अब्दालीला बोलावून पानिपतचे युद्ध घडवून आणले. मल्हारबांनी गनिमी काव्याने युद्ध करण्याचा सल्ला भाऊसाहेब पेशव्यांना देऊनसुद्धा त्यांनी त्याकडे दुर्लक्ष केले आणि रणांगणात मराठ्यांना पराभव स्वीकारावा लागला.मल्हारराव आणि त्यांचे साथीदार कसे बसे जीव वाचवून बाहेर पडले.
पराभवाचे शल्य मनामध्ये बोचत असतानाच, आणखी एक दुःखद धक्का बसला, त्यांची पहिली पत्नी गौतमाबाई २९ सप्टेबर १७६१ रोजी मृत्यूमुखी पडल्या त्यामुळे ते आणखीनच खचले. अहिल्येची राजकारणातील समज पाहून मल्हारबा अनेकदा तिच्याशी सल्ला मसलत करीत असत, स्वतः मोहिमेवर असताना दौलतीची आणि खाजगीची दोन्ही जबाबदा-या अहिल्येला पार पाडाव्या लागत होत्या.

पानिपतनंतर मराठे शाहीची बिघडलेली घडी पुन्हा बसविण्यात माधवराव पेशव्यांबरोबर मल्हार रावांनी पुढाकार घेतला आणि सलग मोहिमा आखून स्वतःला व्यस्त ठेवू लागले. अशाच एका मोहिमेवर असताना २० मे १७६६ रोजी आलमपूर येथे मल्हारवांना मृत्यूने गाठले. मराठेशाहीतील आधाराचा गरुड खांब कोसळला, मराठे शोकाकुल झाले. आपल्या संपूर्ण हयातीत त्यांनी चार पेशव्यांच्या कारकिर्दी बघितल्या, पेशव्यांच्या घरात त्यांना वडिलकीचा मान होता. अहिल्यादेवींनी त्यांच्या पश्चात आलमपूरचे नाव बदलून मल्हारनगर ठेवले आणि तेथे त्यांची छत्री उभी केली.
छत्रपती शिवाजी महाराजांनी उभे केलेले स्वराज्य, निष्ठेने वाढविण्याची जबादारी सुभेदार मल्हारराव होळकरांनी आपल्या खांद्यावर घेतली होती. मराठी साम्राज्य वाढविण्याकामी मल्हारबांनी आपले सर्वस्व पणाला लावले आणि मराठी साम्राज्याच्या सीमा, सिंधू नदी पर्यंत वाढविल्या. आयुष्यामध्ये जी काही प्रगती झाली ती जेजुरीच्या खंडेराया मुळेच अशी त्यांची धारणा असल्याने त्यांनी कधीही या दैवताचा विसर पडू दिला नाही. 

आयामल्हार (मल्हाररावहोळकरयांच्याजीवनावरीलऐतिहासिककादंबरी) Year : 1994

Authors:ओगलेअनंतशंकर Physical details: 160 Subject(s):ओगलेअनंतशंकर
 
 


                  कुरब - धनगर समाजाचे विजयनगर साम्राज्य


                                                        कुरब - धनगर समाजाचे विजयनगर साम्राज्य



व्ंिाध्यपर्वताच्याखाली दक्षिण भारतात २०० वर्षे टिकलेली व संपूर्ण भारतामध्ये नावारुपास आलेली दोन राज्य म्हणजे विजयानगर साम्राज्य व बहामनी राज्य. या दोन्ही राज्यांनी कायदा, सुव्यवस्था, स्थापन करण्यात तर स्पृहणीय यश मिळवलेच पण इतरही अनेक क्षेत्रात स्मरणात राहील अशी महान कामगीरी बजावली भव्य राजधान्या व शहरे तेथील सुंदर व कलात्मक इमारती, कला वाड:मय,हस्तकला या क्षेत्रांत संस्मरणीय योगदान केले. व्यापार वृध्दी या काळातील एक विशेष लक्षणीय वैशिष्ये होय. उत्तर भारतात राजकीय अस्थिर वातावरण असताना दक्षिणेस यात प्रदीर्घकाळ टिकलेली स्थैर्याची परिस्थिती होती. बहामनी राज्याच र्‍हास १५ व्या शतकाअखेर झाला. तर विजयानगर साम्राज्य पुढंे ५० वर्षानी राक्षसतांगडीच्या लढाईतील पराभवाने नष्ट झाले. याच काळात भारतीय उपखंडातलील एकंदर चित्र पालटण्यास सुरुवात झालेली होती. पाुर्तुगिजांच्या आगमनाने पश्चिमकिनारपट्टीवर एक नवे पर्व सुरु झाले. त्यांनी भारतीय समुद्रकिनार्‍यावर प्रभुत्व प्रस्थापित करण्याचे प्रयत्न सुरु केले. उत्तर भारतात मुघलांच्या आगमनाने दिल्लीची सुलतानशाही संपुष्टात आली. बाबरांनी मुघल साम्राज्याची स्थापन केली. उज्ञ्ल्त्;ारत्र स्थिरावलेले मुघल व समुद्र किनारा काबीज करण्याची संघर्षात उतरू पहाणारे युरोपियन साम्राज्यावादी यांच्यात नजीकच्या भविष्यातच सज्ञ्ल्त्;ाा स्पर्धा सुरु झाली.
विजानगर साम्राज्याचा उदय व उत्कर्ष : ५ भावंडाच्या कुटुंबातील हरिहर व बुक्क या बंधूनी विजयानगर राज्याची स्थापना केली. एका दंतकथेनुसार हे दोघे बंधू काकतिय राज्याचे मांडलिक होते. पुढे ते कर्नाटकातील कांम्पिली राज्यांचे मंत्री बनले. काम्पिली राज्य महंमदबीन तुघलकानी नष्ट केले. त्यावेळी हरिहर व बुक्क हे कैदी म्हणून पकडले गेले. त्यास मुस्लिम धर्माची दीक्षा देण्यात आली व जिंकित प्रदेशाचा कारभार पाहण्यास सांगण्यास आले. मदुराई येथे स्थानिक कारभार पाहणार्‍या प्रांताधिकार्‍यांचे बंडखोरी करुन तेथे स्वतंत्र राज्य स्थापन केलेले होते. तुघलकाचे अधिपत्य झुगारुन स्वतंत्र होण्याचे प्रयत्न म्हैसूरचे होयसळ, बरंगळे काकतिय राजे करु लागलेले होते. हरिहर व बुक्क बंधूनी आपल्या नव्या धर्माचा तसेच नव्या धन्याचा त्याग करण्याचा निर्णय घेतला. दोघा बंधूचे शुध्दीकरण करून हिंदू धर्मातील पुनस्वीकार करणे कामी त्यांचे गुरु विद्यारण्य स्वामीनी पुढाकार घेतला. त्यानंतर विजयानगर येथे राजधानी स्थापन करुन तेथे नव्या राज्याची मुहूर्तमेढ रोवली. हरिहरांनी या नव्या राजधानीच्या ठिकाणी इ.स. १३३६ मध्ये राज्याभिषेक करवून घेतला.
प्रारंभी हया नव्याने स्थापन झालेल्या राज्यास एका बाजूने म्हैसुरच्या होयसळ तर दुसर्‍या बाजूने मदुराईच्या सुलताशी संघर्ष करणे क्रमप्राप्तच होते. मदुराईचा सुलतान अत्यंत महत्वाकांक्षी होता. त्यानी होयसळांचा संघर्षामध्ये पराभव तर केलाच होता पण तेथील राज्यकर्त्यास अत्यंत क्रुर व अमानुषपणे मारलेही होते. होयसळांचा संपूर्ण भूमी विजयानगर राज्यकर्त्याच्या आधिपत्याखाली आली. हया प्रयत्नात हरिहर बुक्क यांना अन्य बंधू व आप्तेष्टांचे सहाय्य लाभले. त्यांच्यापैकी अनेकांनी जिंकीत प्रदेशात प्रशासनकार्य सुरु केले. एक प्रकारची सहकारी तत्वावरील राष्ट्रकुल पध्दतीस त्याद्वारा आंमलात आली. हरिहरांनतर बुक्क राजपदावर आला व त्यांनी इ. स. १३७७ अखेर राज्य केले.
बहामनी व विजयनगर साम्राज्य यांचे तीन मुख्य कारणावरून सततचे संघर्ष उदभवू लागले. ही कारण तीन वेगवेगळया भूप्रदेश वरून उदभवत असत. पैकी पहिला मुख्य भूप्रदेश म्हणजे तुंगभद्रेच्या दुआबातील सुपीक प्रदेश होता. गोदावरी-कृष्णेच्या परिसरातील हा प्रदेश अत्यंत सुपीक असल्याने संपन्न असा होता. त्यास लागुनच मराठवाडा हा गोदावरी तुंगभद्रेचा प्रदेश संपन्न समृध्द असा होता. सुपीक व संपन्न असा हा प्रदेश आजतागयत सतांच्या संघर्षाचे निमित्त अनेकदा बनलेला होता. पश्चिमेचे चालुक्य व चोल त्यानंतर यादव व होयसळ यांचे नेहमीच हयाच प्रदेशावरून वाद उदभवत असे. कृष्णा, गोदावरी परिसरातील भूप्रदेश सुपीक संपन्न असण्या बरोबरच अनेक बंदरांचाही होता. तेथून चालणारा व्यापार हा महत्वपूर्ण घटक होता. त्यांच्या जवळच असलेला तुंगभद्रेचा दुआब ही त्याच्याशीच जोडला जाणारा असाच भूप्रदेश होता. महाराष्ट्र्रातील हया दोन सत्तांच्या संघर्षाचे निमित्त कोकण व त्यास जोडणारा भूप्रदेश होते. पश्चिम घाट व अरबी समुद्र यांच्यातील भूप्रदेश कोंकण बंदराची भूमी होती. अत्यंत सुपीक असे हे कोकण गोवा बंदराच्या नजीक होते. हया बंदरावरुन महत्वाच्या मालाची ने-आण कैक वर्षापासून चाललेली होती. प्रामुख्याने येथे उत्तम प्रतीचे घोडे इराण इराक कडून येत असत. हे उत्तम प्रतीचे इराणी इराकी घोडे दाक्षिणात्य राज्यकर्त्यानी नेहमीच आवश्यक असत.
मदुराई सुलतानाचा शेवट होताच विजयानगर सम्राटांनी पुर्व समुद्र किनार्‍यावर प्रभुत्व प्रस्थापिण्याचा चंग बाधला हया विस्तार धोरणाचा दुसरा हरिहर इ.स. १३७७-१४०६ हा महत्वाकांक्षी सम्राट शिल्पकार होता. हया परिसरात हिंदू राज्यकर्त्याची राज्ये एका साखळी सारखी मालिकेत होती. त्यामध्ये कृष्णा- गोदावरीच्या पोतातील वरच्या अंगास रेड्डी तर खालील बाजूस वरंगळचे राज्यकर्ते होते. उत्तरेचे ओरिसा मधील राज्यकर्ते तर पूर्वेकडील बहामनी ,सुलतानही हया सुपीक भूमीवर नजर ठेवून होतेच वरंगळच्या राजानी हसन गंगूस त्याच्या दिल्लीकरांशी चाललेल्या संघर्षास सदैव सहाय्य केलेले होते. पण हसन गंगूच्या वारसांनी हे ऋण विसरून वरंगळकरांची बरीच भूमी आक्रमण करुन जिंकून घेतलेली होती. त्यामध्ये गोवळकोंडयांचा भूप्रदेश समाविष्ट होता. हया संघर्षात लक्ष घालण्याची फुरसत विजयानगर सम्राटांना मिळाली नाही कारण ते दक्षिणेकडील संघर्षात गुंतलेले होते. चोलांची शक्ितशाली व मजबूत अशी गोवळकोंडयाची किल्ल्यांची भूमी आपली सरहद म्हणून निश्चित करुन सुलतांनी वरंगळकरांना भावी काळात आक्रमण न करण्यांचे आश्र्वासन देऊन तंटा तात्पुरता मिटवला. हया समझोत्याच्या स्मरणार्थ वरंगळ राज्यकर्त्यानी बहमनी सुलतानास रत्नजडीत सिंहासन भेट म्हणून दिले होते. वरंगळकर हे सिंहासन तुघलक महंमदास भेट देणार होते. हा ऐतिहासिक समझोता पुढे पन्नास वर्षे व त्यांना बहूमनीस हुसकावुन लावणे त्यामुळेच शक्य झाले नाही. बहुमनी -विजयानगर संघर्ष अनेक दाक्षिणात्य इतिहासकारानी वर्णिलेला आहे. पण यातून निश्चित असे काहीच हाती लागत नव्हते. संघर्षात कधी एका पक्षाची तर कधी विरूध्द पक्षाची सरशी होई व अखेर अनिर्णात अवस्थेत संपत असे. दुसरा हरिहर हया संघर्षमय वातावरणातही आपले स्थान व महत्व टिकवून ठेवण्यात यशस्वी होत होता. त्याचे प्रमुख बलस्थान व यश म्हणजे. त्यानी बहमनी सुलतानाकडुन बेळगाव व गोवा जिंकून घेतले होते. त्यानी उत्तर श्रीलंकेवरही मोहीम घेतली होती. दुसर्‍या हरिहरांनतर विजयानगर राज्यात वारसावरून गोंधळ माजला. त्यामध्ये अखेरीस देवराजा (इ.स. १४०६-१४२२) यशस्वी झाला. त्याच्या कारकिर्दीतचच्या आरंभीच तुंगभद्रेच्या दुआबातील प्रदेशावरुन संघर्षास पुन्हा सुरुवात झाली. थोरल्या देवराजाचा बहमनी सुलतान फिरोजशहाने पराभव केला. त्याच्याकडून जबर खंडणी केली. त्यामध्ये दहा लाख होन हिरे व हज्ञ्ल्त्;ाी घेतले. बहमनी राज्यकर्त्यास बंकापुन ही बहाल करावे लागले.
बहामनी सुलतान व विजयानगर सम्राट यांच्यात हा संघर्षाच्या निमिज्ञ्ल्त्;ााने तो समझोता झाला. त्यामधून दोन्ही घराण्यांचे वैवाहिक सबंधही प्रस्थापित झाले. बहमनी सुलतान फिरोजशहा याचा फार मोठा गौरव व आदरसत्कार राजधानीत करण्यात आला. याच फिरोजशहाने हया आधीच केरळच्या राज्यकर्त्याशी वैवाहिक सबंध जुळवुन आणले होते. पण राजकारणात त्याचा काही फारसा परिणाम व प्रभाव पडल्याचे यात जाणवत नाही. कृष्णा-गोदावरी नद्यांच्या पोतातील भू प्रदेश बहमनी विजयानगर व ओरिसा राज्यकर्त्याच्या संघर्षास पुनश्च कारणीभुत ठरू लागला. रेड्डी राज्यकर्त्याच्या राज्यात वारसावरुन गोंधळ उदभवल्याचे पाहुन विजयानगर सम्राट व वरंगळचा राजा त्याचा फायदा घेण्यासाठी एकत्र आले. देवरायांनी बहमनीच्या फिरोजशहावर हल्ला करुन त्याचा संपुर्ण पराभव केला व आपले राज्य कृष्णेच्या तोंडापर्यत आणून भिडविले.
भक्कम तयारीनिशी दुसर्‍या देवरायाने गमाविलेला प्रदेश परत हस्तगत करण्याचा चंग बांधला इ.स. १४४३ मध्ये त्यांनी तुंगभद्रा ओलांडली मुदकन बंकापुर हे कृष्णेच्या दक्षिणेकडील भुप्रदेश पूर्वी बहमनी सुलतानानी जिंकून घेतलेले होते. त्यासाठी तीन प्रमुख संघर्ष झाले पण त्याचा निर्णायक शेवट यात होऊ शकला नाही पुनश्च जैसे थे हेच सरहद्दी बाबत धोरण मान्य करुन देवराया परत आला. एक पोर्तुगीज लेखक नुतीझ म्हणतो की देवरायास क्विलीन श्रीलंका पुनीकत. तेनासेरीम (ब्रहादेश -मलाया परिसरातील) येथील राज्यकर्ते दरसाल जबर खंडणी पाठवीत याचा अर्थ एवढाच की हे राज्यकर्ते विजयानगर सम्राटांना नजरणे भेटी पाठवून मैत्रीपूर्ण सबंध राखून होते. श्रीलंकेवर यात अनेक वेळा हल्ले केले होते. व तेथील बराच भूप्रदेश विजयानगरच्या आधिपत्याखाली होता. तेवढे नाविक सामर्थ्य वियजानगरचे खचितच होते.
अब्दुल रझाक हा एक असाच प्रवासी विजयानगरचे वर्णन करतांना त्यास जगातील अप्रतिम शहर म्हणतो. तो कदाचित हया शहरास भेट देऊन गेला तरी असेल किंवा त्याची किर्ती त्याच्या कानावर तरी पडली असावी. शहराचे वर्णन करताना रझाक काय म्हणतो. नगररचनाच मुळात अशी खुबीने केलेली आहे. की सात तटबंदीने ते बंदिस्त असे भक्कम शहर बनलेले आहे. सातव्या भाषांतरांवरूनंिातीत आतील मुख्य परिसर हिरात शहराच्या दसपट तरी नक्कीच असावा राजवाडयापासुन सुरु होणारी बाजारपेठ चार बाजारपेठा सामावणारी होती. बाजार दूर दूर पसरलेले व भव्य असे विस्तारलेले होते. भारतातील पारंपारिक रिवाजाप्रमाणे विविध वर्णाचे लोक किंवा भागांतुन राहात असत. मुस्लिग वस्त्या स्वतंत्र व अलग दिसत होत्या बाजारातून व सम्राटांच्या राजवाडयातून खळाळून वाहणारे पाण्याचे कालवे दिसतात. हे कालवे सुंदर आकर्षक अशा दगाडांचे तकतकीत पॉलिश केलेले आहेत. दुसरा एक प्रवासी विजयानगर रोम पेक्षा मोठे असल्याचे नमूद करतो. विजानगर सम्राटांची समकालीन विश्र्वात एक अत्यंत श्रीमंत सम्राट म्हणून ख्याती होती. असे रझाक म्हणतो. त्यांनी राजवाडयात जागोजागी प्रचंड दडवून ठेवलेल्या संपत्तीचा उल्लेख केला आहे. अर्थात ही फार जुनी चालरीत व परंपरा आहे. हेच आक्रमकांना आकर्षण ठरलेले होते.
बहमनी राज्य :
या काळातील सुप्रसिध्द बहमनी राज्यकर्ता म्हणजे फिरोझशहा बहमनी (इ.स. १३९७-१४२२) हा होय. धर्मशास्त्राचा पंडित असण्याबरोबर तो कुराणावरील भाष्य व कायदा पध्दती ही पुर्णपणे आत्मसात केलेला होता. त्यास निसर्ग विज्ञान, वनस्पतीशास्त्र व तर्कशास्त्र हयामध्ये ही विशेष रुची व रस होता. उत्कृष्ट हस्ताक्षर असण्याबरोबर तो उत्तम कवी होता. व उत्यस्फूर्तपणे तो काव्य करीत असे फरिश्ता तर म्हणतो की हा बहमनी सुलतान फार्सी अरेबिक व तुकर्ी भाषा पंडित असण्या बरोबर तेलगु कन्नड व मराठी ही उत्तम प्रकारे वाचू लिहू शतक होता. आपल्या विविध भाषिक आप्तेष्टांशी तो त्यांच्या भाषेत काव्य विनोद करीत असे.
फिरोज शहा बहामनीची दख्खन संपूर्ण देशाचे कला व संस्कृती केद्र बनावे अशी महत्वाकांक्षा होती दिल्ली सुलतानशाहीचा र्‍हास त्यादृष्टीने त्यास फायद्याचा ठरला. अनेक विद्वान कलाकार, साहित्यिक दक्षिणेत त्याच्याकडे आश्रयार्थ आले तसेच इराण-इराक कडूनही विद्वानांनी आपल्याकडे यावे म्हणून तो प्रोत्साहन देत असे. राज्यकर्त्यानी नेहमी अशा विविध देशांतील विविध विषयांतील विद्वानांच्या संगतीतच रहावे असे तो म्हणत असे. त्यांच्या सहवासानी नवनवीन माहिती व ज्ञान मिळविता येते व विविध देशातुन प्रवास केल्याचा आनंद ही मिळविता येतो दिवसातील बहुतेक वेळ तो अशा विद्वतजनांच्या संगतीत घालवित असे आध्यात्मिक विषय, काव्य, इतिहास यावर विद्वानांशी तो चर्चा वादविवाद करीत असे. बहुतेक सर्व धर्माच्या धर्मग्रंथाचा त्यांनी गंभीरपणे अभ्यास केलेला असल्याने त्याच्या सर्वच धर्माबदल सदभाव व आदर होता. फरिश्ता यात त्यास सनातनी मुसलमान मानतो. मद्यपान, संगीत हे यात त्याचे छंद होते.
फिरोझशहानी आपल्या प्रशासनात सर्व धर्मीयांचा विशेषत हिंदूंचा फार मोठया प्रमाणावर कर्तबगारी होय. हिंदूंच्या भरतीने प्रशासनात संतुलन निर्माण होऊ शकले. खगोलशास्त्रास प्रोत्साहन देण्यासाठी त्यांनी दौलताबादला वेधशाळा उभारली. बंदरावर विशेष लक्ष ठेवून फिरोझने चौल, दाभोळ या बंदराचा विकास घडवून आणला. तेथे पर्शियन आखातातून तसेच तांबडया समुद्राकडून अनेक चैनीच्या वस्तू जगभरातून येऊ लागल्या बहमनी केरळचा नरसिंह याच्या वरील हल्ल्यांनी केला पराभतू नरस्ंिारायनी त्याचे मांडलिकत्व मान्य केले व अमीरपद स्वीकारुन खेरळचे राज्य स्वत:कडेच ठेवण्यात यश मिळविले अर्थात त्यासाठी चाळीस हज्ञ्ल्त्;ा्ी. पाच मण सोने व चाळीस मण रुपये त्यास मोल म्हणून मोजावे लागले. पण वियजयानगर आघाडीवर यात त्यास देवरायाकडून पराभव पत्कारावा लागला होता. हया पराभवांनी वृध्दत्वाकडे झुकलेल्या फिरोझची अवस्था दयनीय झाली. दरम्यान त्यांनी आपल्या दोन विश्र्वासू गुलामांना शिरजोर बनण्यास संधी दिलेली होती. ती त्याच्या अंगलट आली. त्यांनी सुलतानाचा भाऊ व त्याच्या सर्व मोहिमेतील सच्चा सहकारी अहंमद याचा खून केला. त्यामूळे राज्यात सर्वत्र बंडाळी माजली. त्यांना संन्यास घेणे भाग पडले लवकरच तो मरण पावला.
थोरला अहंमद सुलतानपदी आला तो वाली (संत) म्हणून ओळखला जाई. सुफी संत गेंसू दराझ याचा तो आवडता भक्त होता. गेंसू दरझ दिल्ली कडून येवून दक्षिणेत स्थायिक झालेला सुफी संत होता. त्याच्या भक्तामध्ये हिंदू व मुस्लीम धर्माचे अनेकजणं होते थोरल्या अहंमदशहानी पूर्वेकडे आपले राज्य वाढविण्याचा प्रयत्न सुरु केला. वरंगळच्या राज्यकर्त्यानी विजयानगर सम्राटांशी स्नेहपुर्ण तह करणे व अलिकडच्याच दोन संघर्षात त्यांच्या बाजूने लढणे शहास करुन आपल्या राज्यात समाविष्ट केले. राज्यास बळकटी व भक्कमपणा यावा हया उदेशाने त्यांनी गुलबर्गा येथून राजधानी हलवून बीदरला आणली त्यांनतर त्यानी माळवा, गोंडवन व कोकण इकडे आपले लक्ष वळविले.
इ.स. च्या चौदाव्या शतकापासून दक्षिणेत विविध राज्यकर्त्यामध्ये सातत्याने संघर्ष चालला होता. त्याचे प्रमुख कारण पाहून गेल्यास भूप्रदेश व व्यापार यावर नियत्रंण हेच निर्णायक दिसते. शिवाय संघर्ष बर्‍याच वेळा दक्षिण व उत्तर असेही रुप धारण करीत असे. पश्चिमेकडे माळवा, गुजराथ, संघर्षात गोवले जाऊन दख्खनेच्या राजकारणात ते ही अडकले जात. पूर्वेकडे ओरिसा, बंगालपर्यंत हा संघर्ष पसरला असल्यानी त्यांची छाया पूर्वेच्या कोरोमंडल किनार्‍यावरही पडलेली होती. ओरिसाच्या राज्यकर्त्यानी इ.स. १४५० नंतर आपले दक्षिणेवरील लक्ष जास्त सूक्ष्म करून वारंवार हल्ले करण्यास सुरूवात आले तेथे दुसर्‍या देवरायाच्या मृत्यूचे वारसा प्रश्नारुन गोंधळ उडलेला होता.
महंमद गवाणाने प्रशासनात व राज्यात अनेक नव्या सुधारणा सुरु केल्या. राज्याचे आठ भाग करुन त्यास तरु म्हटले जाऊ लागले. त्याच्या प्रमुखास तरफदार म्हणण्यात येई. प्रत्येक उमरावाचे वेतन व कर्तव्ये निश्चित ठरविली जात. पांचशे घोडयांचे अश्र्वदळ असणार्‍या उमरावास वर्षाकाठी एक लाख होन ऐवढे मानधन असे वेतन देण्याचे दोन्ही पर्याय असत. ते रोखीत मिळे अथवा जहागीर दिली जाई. ज्याना जमिनी दिल्या जात त्यांना महसूल संकलनाचा खर्च भागविण्यासाठी सवलत होती.
कलेचा भोक्ता गवाणानी राजधानी बीदर येथे सुंदर मदरसा (शाळा) बांधली हया तीन मजली इमारतीत एक हजार विद्यार्थी शिक्षक समावू एवढी एैस पैसा जागा होती. रंगीत संगमरवरी दगडापासून तिचे बांधकाम करणेत आलेले होते. तेथील शिक्षक विद्याथ्र्यांना गुरुकुल पध्दतीने शिक्षण कार्य करता येई इराण, इराककडून अनेक नातवंत विद्वान तेथे शिक्षणासाठी येत त्यास गवाणाचे प्रोत्साहन असे उमरावंाचे परस्परातील संघर्ष हा एक सुलतान पुढील चिंतनीय विषय होता. जुने नवे नवागतामध्ये असल्याने त्यास विश्र्वास संपादनाच्या दृष्टीने बरेच प्रयत्न करवे लागले. त्यांनी उदार धोरण ठेवून बरीच सहनशीलता दाखविली पण तंटे, संघर्ष कमी होत नव्हते.तरुण सुलतानाचे कान भरण्यात गवाणाचे विरोधक यशस्वी झाले त्यास इ.स. १४८२ मध्ये फाशी देण्यात आले. त्यावेळी तो सतरा वर्षाचा होता. त्यामुळे अंतर्गत संघर्ष वाढला. प्रांताधिकारी स्वतंत्र होऊ लागले. लवकरच बहमनी राज्याचे तुकडे झाले. त्यातूनच पांच दख्खनी शाहया उदयास आल्या. गोवळकोंडा, बीदर, अहमदनगर, बेरार, व विजापुर, अशा सुलतान शाहयांचा उदय होऊन उण्या पुर्‍या दीडशे वर्षातच बहमनी राज्य संपुष्टात आले. हयापैकी विजापुर, अहमदनगर, व गोवळकोंडयाच्या सुलतानानी दख्खनच्या राजाकारणात महत्वपूर्ण कामगिरी बजावलेली आहे. अखेर औरंगजेब बादशहांनी हया सर्वच शाहया संपुष्टात आणून बहमनीचे कवारस संपवून टाकले.
बहमनी उत्तर व दक्षिण हयांना जोडणारा सांस्कृतीक दुवा मानण्यात येते. बहमनींच्या काळात एक स्वंतत्र आगळीवेगळी संस्कृती विकसित झाली. ती उत्तरे पेक्षा फारच निराळी होती. हीच सांस्कृतिक परंपरापुढे बरीच टिकून राहिली एवढेच नव्हे तर मुघलांनी पण त्याचे अनुकरण केले.
विजयानगर साम्राज्याचा वैभव काळ व र्‍हास :
 दुसर्‍या देवरायाच्या मृत्युनंतर काही काळ विजयायनगर साम्राज्यात गोंधळ माजला. वारसा बाबत निश्चित अशी भूमिका अथवा परंपरा नसल्यामुळे प्रतिस्पध्र्यामध्ये यादवी उदभवली. हया गोंधळचा फायदा उठवून अनेक मांडलिक स्वतंत्र झालेत, मंत्री शिरजोर बनले व प्रजेकडून करपट्टया जुलमाने गोळा करु लागले भेटी, नजराणे उकळू लागले. संस्थापक संगम घराणे सज्ञ्ल्त्;ाा भाषांतरांवरूनरष्ट झाले. कायदा व सुव्यवस्था पुनर्स्थापित करुन सलुवा घराण्यानी सज्ञ्ल्त्;ाा काबीज केली. त्यांच्याही लतकरच शेवट झाला. अखेर कृष्णदेवयराय यांनी तुळवा घराण्याची स्थापना केली. कृष्णदेवराय (इ.स. १५०९-१५३०) हा विजयानगरचा सर्वश्रेष्ठ व नामवंत सम्राट होय. राज्याची विस्कटलेली घडी पुन्हा भक्कमपणे बसविण्या बरोबरच त्यास पुर्वापार चालत आलेले राज्याचे वैरी व शेतू यांचाही बंदोबस्त करणे क्रमप्राप्त होते. त्यामध्ये पांच शाहया व ओरिसाचे राज्यकर्ते हे प्रमुख होते. त्यास आतां सागरावरील पोर्तुगीज नाविक शक्तीची भरच पडली. होती सागरी सामर्थ्याचा प्रभावी वापर करुन त्यांनी किनारपटटीवरील अनेक लहान राज्यांना उखडून काढले. त्याचा त्यांना राजाकीय व आर्थिक दृष्टीने बराच फायदा झाला. तटस्थ राहून पोर्तुगीजांनी राजाची मर्जी संपादण्याचा प्रयत्न केला. त्यास गोवा विजापुरकरांकडून परत मिळवून देण्यासाठी सहाय्य करण्याचे आश्र्वासन देण्याबरोबरच उत्तम घोडेही पुरविण्याची तयारी दर्शविली.
कृष्णदेवरायानी लागोपाठ आक्रमण करून ओरिसाच्या राज्यकर्त्याकडून कृष्णेच्या परिसरातील गमावलेला प्रदेश पुन्हा परत मिळविला. आपल्या सामर्थ्याची जुळवाजुळव करून त्यांनी आतां तुंगभद्रा दुआबाकडे आपले लक्ष वळविले. यामुळे त्याचे दोन तुल्यबळ शत्रू ओरिसा व विजापुरचे राज्यकर्ते संघटित झाले. याची चाहूल लागताच कृष्णदेवरायांनी जोरदार तयारी सुरु केली. रायचूर व मुदकलवर हल्ला केला. या मोहिमेत त्यानी विजापूरच्या आदिलशहाचा (इ.स. १५२०) संपूर्ण पराभव केला. विजापूरकर कृष्णेच्या पैलतीरावर ढकलले गेले. विजयानगर सैनिकांनी बेळगाव जिंकून विजापूरवर हल्ला केला. राजधानीचा त्यांनी पुर्णपणे नाश करुन टाकला. तेथून त्यांनी गुलबर्गावर हल्ला केला व तह होण्याच्या आत ते शहर ही त्यांनी उध्वस्त केले. कृष्णदेवरायाच्या हया पराक्रमानी विजयानगर पुनश्च एक शक्ती बनले. आपापसातील सज्ञ्ल्त्;ाा स्पर्धेमध्ये गुंतलेले हा दक्षिणात्य राजा एका गोष्टीकडे यात पूर्ण दुर्लक्ष करीत होता. पोर्तुगीजांचा समुद्र किनार्‍यावरील उदय व त्यांचा व्यापार्‍यावरील प्रभाव त्यांना भावी काळात धोकादायक ठरेल. हयाची शंकाही आली नाही. कृष्णदेवराची नाविकदलाकडे दुर्लक्ष केले. विजयानगरच्या साम्राज्यातील विविध भागातून अनेक परकिय प्रवासी येवून गेले. त्यांच्या प्रवास वर्णणातून विविध उदबोधक माहिती मिळते.
विजापूरकारांवर हल्ला करुन त्यांचा रामराजाने संपूर्ण पराभव केला. विजापूरकरांच्या मदतीने त्यानी मग गोवळकोंडयाच्या कुतुबशहाचा व नगरच्या निजामशहाचा पराभव केला. हया खटाठोपामागे त्याची सज्ञ्ल्त्;ाा संतुलीत करुन आपला फायदा करुन घेणे एवढाच हेतु होता. या सर्व डावपेचाचा पट उलटला व त्याच्या अंगलट आला. सर्व सुलतान संघटित झाले व ते विजायानगर चालुन गेले. त्यांच्या संयुक्त फौजेने विजयानगर साम्राज्याचा शेवट घडवून आणले. ही प्रसिध्द लढाई राक्षसतांगडी येथे (२३ जानेवारी १५६५) झाली. हया लढाईच्या ऐन प्रसंगी विजयानगर चे लष्कर त्यांच्यावर उलटले लष्करातील मुस्लिम सैनिकांनी सुलतानांच्या सैन्याबरोबर हातमिळविणी करुन आपल्याच धन्याचे राज्य धुळीस मिळविले. कित्येक वर्षे पुढेही राज्य तग धरुन होते पण त्याचे वैभव, दरारा यात संपलेला होता.
विजयानगर कालीन समालोचन :
विजायानगरचे सम्राट राजपदाबाबत उच्च कोटीची भावना बाळगून होते. कृष्णदेवराय त्याबाबत लिहितो. जेव्हा व जसे शक्य असेल तेव्हा राजाने जनतेची सेवा करावी कराचा भार नेहमी हलका असावा राजाच्या मदतीसाठी मंत्री परिषद असे. त्यामध्ये बडे उमराव असत. राज्याचे राजस किंवा मंडळास नावाने ओळखले जाणार विभाग असत. नाडू (जिल्हा) स्थळ, (तालुका) व ग्राम (खेडे ) असे प्रातांचे विविध भाग असत. चोलांनी ग्रामव्यवस्था विजयानगर मध्ये तशीच चालू होती. प्रांताधिकारी बहुधा राजपुत्रच असत. काही वेळा कुटुंबातील इतर नातेवाईकही हया पदावर नियुक्त केले जात प्रांतांना प्रशासनात बरीच स्वायतता होती. स्वत:ची न्यायव्यवस्था स्वत:ची नोकरशाही स्वत:चे लष्कर सुध्दा त्यांना ठेवण्याची संधी होती. प्रांताधिकारी नवे कर आकारु शकत असे. तसेच जुने रद्द ही करू शकत असे. त्यास केंदि्रय शासनास ठराविक रक्कम मनुष्यबळ द्यावे लागे. साम्राज्याने उत्पन्न सव्वा कोटी परदोस असेल तर त्यापैकी निम्मे उत्पन्न केंद्र शासनाचे असे.
युध्दात पराभूत झालेल्या राज्यकर्त्याना त्यांची राज्ये प्रशासनासाठी परत दिली जात हे इनामदार म्हणून देण्याची (अमरम) प्रथा होती. जमिनी लष्करी प्रमुखांना इनाम म्हणून दिल्या जात. हे इमामदार पाळेगार अथवा नायक म्हणून ओळखले जात. त्यांना ठराविक संख्येचे अश्र्वदळ, हत्तीदळ, व पायदळ पदंरी कायमचे बाळगावे लागे. शासनाकडून मागणी येताच त्यांच्या सेवेशी हरज व्हावे लागे. नायक, पाळेगार, पुढे शक्ितशाली बनले व शिरजोर बनत जाऊन विजयानगर साम्राज्य आतून पोखरण्यास कारण ठरले. त्यामुळेच त्यांचा दारुण पराभव झाला. तंजावर, मदुराई येथील नायक पुढे स्वतंत्र झाले.
विजयनगरच्या कलाकौशल्याची विस्तृत वर्णने तत्कालीन विदेशी प्रवाशंानी करुन अमर केली आहेत. भव्यता व कलात्मकता ही हया काळातील कलेचे विशेष तुंगभद्रेच्या दक्षिणेस या कालातील कलेची साक्ष आज ही आहे. विजयानगरातील विठठ्ल मंदिर कला कौशल्याचा उत्कृष्ट नमुना आहे. देवराय दुसरा याचे काळात ते बांधण्यास सुरुवात झाली. पण ते कधीच पुर्ण होऊ शकले नाही. त्याचे आवार पाचशे फूट लांब तीनशे फूट रुंद आहे. यावरूनच त्याच्या भव्यतेची कल्पना येते. मंदिराचा महामंडप शंभर फूट आहे. कल्याणमंडप त्याहून निम्मा आहे. कलाकौशल्याचे दृष्टीने अप्रतिम आहे. हे विठठ्ल मंदिर दोनशे तीस फूट लांब व पंचवीस फूट उंच आहे. विरुपाक्ष दुसरा याने बांधलेले हजारमंदिर याचेशी तुलनेने साधे पण विजयनगरच्या शिल्पपध्दतीचा उत्कृष्ट नमुना आहे. त्याचे भाषांतरांवरूनंिातीवर रामायणातील दृश्ये खोदलेली आहेत. विजयनगरच्या सम्राटाने सभागृह किती विस्तीर्ण असेल याची कल्पना अवशेषावरुन मिळते. यात एका ओळीत शंभर खांब होते. ते एकापेक्षा अधिक उंच अशा तीन चौथर्‍यांचे होते. एका चौथर्‍यावरुन दुसर्‍या चौथर्‍यावर जाण्यासाठी पायर्‍या असत. कलाचे प्रतिबिंब असे दगडी कोरीव काम सर्वत्र दिसून येते. विजयानगरची शक्ती आपणास या कलाकौशल्यात दिसून येते. हे चित्र इतरत्रही पहावयास मिळते. वेलोर कुंभकोणम् कांचीपूरम्, ताडपेती, श्रीरंगम, या ठिकाणी वरील. प्रकारची मंदिरे दिसतात. वेलोर येथील कल्याणमंडप अतिसुंदर आहे. ताडपेती व रामेश्र्वरम येथील गोपुरे कोरीव कामाचा उत्कृष्ट नमूना आहे. शेषगिरी मंडपात उधळलेल्या घोडयाची दगडातील मालिका कला कौशल्याचा एक अप्रतिम नमुना आहे. याशिवाय विजयानगराच्या अखेरच्या काळातील मदुरा शैलीची मंदिरे श्रीरंगम् जंबुकेश्र्वरम् तिन्नेवेल्ली श्रीविल्लीपुरम चिंदबरम् तिरुवन्नमलई, तिरुवातूर, येथे आढळतात.
मदुरा शैलीतील मुख्य मंदिराबाहेरील पुडु मंडपम् अतिभव्य असतात. मदुरेचार मंडपम् तीनशे फूट लांब व एकशे पाच फूट रुंद आहे. त्यातील मध्यवर्ती खांबावर मदुरेचा नायकाच्या पूर्णकृती प्रतिमा कोरलेल्या आहेत. याशिवाय या कालातील मनुष्य कृती प्रतिमाही उपलब्ध आहेत. तिरुपती मंदिरात मिळालेल्या कृष्णदेवराय, वेंकटराय, यांच्या प्रतिकृती या काळातील या प्रकारची उत्कृष्ट उदाहरणे आहेत.
(५) विजयनगर काळातील महाराष्ट्र्र संस्कृती : महाराष्ट्र्र व त्याचा बहुतेक प्रदेश बहमनी व त्याच्यातून उदयास आलेल्या पांचा शाहयांचा राज्यात मोडत असे. त्यापूर्वी सातवाहन व नंतरचे यादव यांच्या राज्यात यात महाराष्ट्र्राचा बहुअंशी समावेश होता. दक्षिण उत्तर यांना जोडणारा दुवा म्हणून बहमनी राज्य खरे तर मानले जाते. पण कार्य महाराष्ट्र्रानीच पार पाडले आहे. म्हणून आर्य, द्रवीड, व नाग, यांच्या मिश्रणावर महाराष्ट्र्र संस्कृती उभी आहे असे म्हणावे लागेल. महाराष्ट्र्राच्या संमिश्र संस्कृतीचे अगदी यथायोग्य दर्शन उत्तर कालात मुसलमानी राजवटीत तर विशेषत्वाने घडते. बहमनी राज्य, नंतरची पांचा प्रमुख मुसलमानी राज्ये उत्तरेकडील मुघल राज्यसज्ञ्ल्त्;ाा यांचा संर्पक महाराष्ट्र्राशी आल्यावर संस्कृतीत देवाण घेवाण मोठया प्रमाणावर झालेली दिसून येते. मुसलमानांनी भाषा अगदी वेगळी आचार पध्दती वेगळी, सर्व क्षेत्रात पडून महाराष्ट्र्राच्या सांस्कृतित नवी नवी भर पडत गेली. महाराष्ट्र्राची प्रादेशिक अस्मिता व देशी भाषेतील विचार धन यांची निर्मिती संतानी स्थापन केलेल्या भक्ती पंथाकडून झाली. मराठी संत हेच महाराष्ट्र्राच्या संस्कृतीचे प्रमुख शिल्पकार ठरतात.
तेराव्या शतकाच्या अखेरीला ज्ञानेश्र्वर, नामदेवांनी आणि सोळा व सतराव्या शतकात एकनाथ, तुकाराम, रामदास या संतानी लोकजीवनास वळण कार्य करणारा मानावा लागतो. वारकरी व महानुभव या दोन्ही पंथाची मूळ प्रेरणा एकच होती. सर्व सामान्य लोकांच्या धर्म भावनेला अध्यात्मविचारांची जोड भाषा म्हणून लोकभाषा मराठीचा अंगीकार केला. नामदेवाचार्यानी केशवराज सूरीला संस्कृत ऐवजी मराठीत लिहावयाला लावले. ज्ञानेश्र्वरादिकांनी आपल्या भक्तिमार्गाचा प्रसार मराठी भाषेद्वार केला. त्यातून मराठी साहित्यांची अखंड परंपरा सुरु झाली. महाराष्ट्र्राच्या लोकजीवनाला सांस्कृतीक अधिष्ठान त्यांनीच मिळवून दिले.
वारकरी पंथातील ज्ञानेश्र्वर, एकनाथांनी लोकभिमुखीवृत्तीवरने आपल्या ग्रंथ लेखनात पौराणिक शैलीचा वापर केला. नामदेव तुकारामांनी आपल्या अभंग रचनेसाठी बोली भाषा मराठीचा वापर केला. त्यामुळे त्याचे वाड:मय आठरा पगड जातीच्या नि विविध पेशांच्या लोकांमध्ये प्रिय झाले. ज्ञानेश्र्वराची सरळ, उदबोधक गीता टिका वारकरी पंथीयांनी पाठच केली. एकनाथी भागवताची लोक पारायणे करु लागली. नामदेव तुकारामाची अभंग वाणी तर महाराष्ट्र्राच्या कानाकोपर्‍यात जाऊन पोहोचली. वारकरी पंथाची कामगिरी मराठी भाषा विकासाच्या दृष्टीने अत्यंत मोलाची आहे. कर्मावर वारकरी पंथांनी फार भर दिला नाही. आपला कामधंदा, व्यवहार सांभाळून संसारातील कर्तव्य कर्म करीत वारकरी धर्माने वागता येते. संसार सोडून वैरागी बनावे लागत नाही. पंढरीची वारी, संतवाड:मयाचे वाचन -मनन , मुखी विठठलाचे नाव एवढे साधेपण वारकरी चळवळीत होते. बहमनी काळात. नाथ-महानुभव वारकरी हे पंथ तेवढे कार्यक्षम राहिले नव्हते सुफी साधंुनी नाथपंथाला निष्प्रभ केले. तर मुस्लिम आक्रमणाच्या काळात महानुभावांची वाताहत झाली. नामदेवानंतर वारकरी पंथही उतरती कळा लागल्यासारखा झाला.
दामाजी, कान्होपात्रा, सेनान्हावी व भानुदास यासारख्यानी वारकरी पंथ टिकवुन ठेवला राजकीय पारतंत्राच्या काळातही हया चार संतांनी वारकरी पंथ, मराठी भाषा व महाराष्ट्र्रीय संस्कृती जोपासली. पुढे एकनाथानी (इ.स. १५३३-१५९९) हेच कार्य अत्यंत बिकट परिस्थितीतही चालू ठेवले. त्यांच्या काळात दज्ञ्ल्त्;ा संप्रदाय वारकरी पंथ व पैठणची परंपरा यांचा सुंदर मिलाफ झाला. तुकाराम, रामदास, आदि संतानी पुढे हेच कार्य अखंडपणे चालू ठेवले.
 
 http://vinaykumarmadane.blogspot.com/2020/03/blog-post_0.html

  Origin of Satvahan




Aitaraeya Brahmana mentions the Andhras as a tribe beyond the borders of Aryan civilization. It groups the Andhras with other, non-Aryan dasyu tribes like the Savaras, Pulindas, and Mutibas. Likewise, the Samanta Pasadika mentions both Andhras and Tamils as non-Aryan "mlecchas".
As per Aitaraeya Brahaman,one day Vishwamitra got enraged and cursed his fifty sons that “They shall become shudra and shall seek shelter of Pundra’s, Aundra’s, Shabar and Mutibs, the shudra kings of southern India. In alternative version it is stated that his son went to south and formed Pundra, Aundra(Satvahan) and other dynasties.
 
 

 भारताचे राष्ट्रीय संवत्सर(शक संवत्सर) सुरु करणारे शककर्ते "महाक्षत्रप चष्टन" आणि त्यांचे वंशज

भारताचे राष्ट्रीय संवत्सर(शक संवत्सर) सुरु करणारे शककर्ते "महाक्षत्रप चष्टन" आणि त्यांचे वंशज
सातवाहन सम्राट गौतमीपुत्र सातकर्णी(शालिवाहन) ने नाशिक येथील नाणेघाट येथे क्षहारात(प्राकृत:खरात) वंशी शक क्षत्रप नहपान यांचा पराभव केल्यावरती खरात लोक साताऱ्याच्या म्हसवड भागात आले.त्यानंतर "कार्दमक" या शक वंशाने उज्जैन येथे शक साम्राज्याची पुनर्स्थापना केली. आजच्या दिवशी इसवी. ७८ साली शक क्षत्रप चष्टन यांनी राज्याभिषेक करून राजा हि उपाधी धारण केली. शक क्षत्रप चष्टन यांचा पुत्र महाक्षत्रप रुद्रदामन अतिशय विद्वान ,प्रजापालक,संस्कृत भाषेवरती प्रभुत्त्व असणारे शासक होते. त्यांनी गुजरात येथील जुनागढ येथे संस्कृत भाषेतील भारतातील सर्वात प्रथम शिलालेख लिहिला.
त्यावेळेस ब्राह्मी हि लिपी सामान्य लोकांना समजण्यासाठी अतिशय क्लीष्ट होती. रुद्रदामन यांनी लिपीच्या विकासावरती सुद्धा फार भर दिला. त्यांच्या जुनागढ येथील संस्कृत शिलालेखात सर्वात प्रथम आजच्या देवनागरीचे पुरावे मिळतात. रुद्रदामन नंतर त्यांचे पुत्र महाक्षत्रप रुद्रासिम्ह गादीवरती बसले.
जुनागढ येथील शिलालेखात रुद्रदामन यांनी शालिवाहनचा पुत्र आणि सातवाहन सम्राट वशिष्ठपुत्र सातकर्णी याच्या राज्याला भ्रष्ट राज्य असे संबोधिले आहे. त्यांनी वशिष्ठपुत्र सातकर्णी याचा संपूर्ण पराभव करून दक्षिणेकडे सातारा ते उत्तरेला सिंधपर्यन्त आपल्या साम्राज्याचा विस्तार केला. एव्हडेचं नव्हे तर वशिष्ठपुत्र सातकर्णी ला सन्मानाने साताऱ्याकडील भाग देऊन त्याला आपला जावई करून घेतले.जनतेच्या हिताची बरीच कामे केली.त्यामुळे महाक्षत्रप रुद्रदामन जनतेत फार लोकप्रिय झाले होते. गुजरातमधील गिरणार येथे चंद्रगुप्त मौर्याने बांधलेल्या सुदर्शन तलावाची दुरुस्ती केली. उजैन ला शैक्षणिक केंद्र बनविले.
सातवाहन सम्राट गौतमीपुत्र सातकर्णी(शालिवाहन) ने नाशिक येथील नाणेघाट येथे क्षहारात(प्राकृत:खरात) वंशी शक क्षत्रप नहपान यांचा पराभव केल्यावरती खरात लोक साताऱ्याच्या म्हसवड भागात आले.पुढे साताऱ्याच्या माण भागात त्यांनी सत्तेची स्थपना केली.हा माण भाग हा कुंतल देशाची राजधानी होती. मानांक हा येथील प्रथम राजा होता. दुसऱ्या शतकातील गुप्त सम्राट चंद्रगुप्त द्वितीय(विक्रमादित्य) याचा राजकवी राजशेखर यांच्या साहित्यात मानकांचा पुत्र देवराज याचे नाव होते.
शक पुरुष पूर्ण पोशाख तर महिला पूर्ण अंग साडीने झाकत होत्या. त्यावेळेस भारतातील पुरुष आणि महिला अर्धनग्न पोशाखात असायचे. त्यावेळेस महाराष्ट्र आणि आंध्र प्रदेशात "औंड्र"(वडार) आणि पंढरपूरचे "पौंड्र" या पशुपालक जमातींचे वर्चस्व होते.

 
 
 
 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 About 108 clans(108 कुळ/कुल) of Dhangars and 22 sub castes (22 पोट जाती).

There are total 108 exogamous groups (clans) of Dhangars found all over India.These clans found Three and half main sub divisions due to division of labour among brothers of one family(एक ही परिवार के सदस्यो में काम का विभाजन हो गया).These are Shepherds(Hatti/Hatkar,Pal,Kuru/Kuruba,Gadariya etc..),Cow herders/Ahir (Yadu and Gawali) or Buffalo keepers(Mahaskar/Gurjar/Gujjar) and wool and blanket weavers(Khutekar,Sangar and Shegar).The half division is butchers(Khatik).All sub sects fall in either of these division.The number three and half is not random selection but has a religious and cosmological significance.
These three and half divisions further divided into 22 endogamous groups (sub-castes).

 गुढीपाडवा इतिहास:

गुढीपाडवा इतिहास:
गुढीपाडवा एक मंगल दिवस.गौतमीपूत्र सातकर्णी या महावीराने नहपान या बलाढ्य क्षहरात(प्राकृत भाषेत:खरात) वंशी शक क्षत्रपावर विजय मिळवून दक्खन स्वतंत्र केला.त्या काळी हा अद्वितीय असा विजयोत्सव गुढ्या उभारून साजरा करण्यात आला. परंतू या विजयाचा महान शिल्पकार गौतमीपुत्राबाबत आणि या विजयाबाबत आपल्याला किती माहिती असते?
इसवी सन.७८ मध्ये ही क्रांती घडली. हा विजयोत्सव प्रजा गुढ्या उभारून साजरा करणे स्वाभाविक होते.अखिल दक्खनेच्या स्वातंत्र्याचा दिवस.या विजयानंतर गौतमीपुत्राने आपले साम्राज्य एवढे बलाढ्य केले की त्याला भारतीय इतिहासात तोड नाही. 'तीन समुद्रांचे पाणी प्यायलेले घोडे ज्याच्याकडे आहेत असे ते सातवाहन' अशी सार्थ उपाधी त्यांना मिळाली.
स्वतःला राजर्षिवधू म्हणवून घेणाऱ्या त्याच्या आईने-गौतमी बलश्रीने-नाशिक येथील शिलालेखात आपल्या पुत्राच्या मागे " क्षहरात(खखरात) वंस -निरवशेषकर शकपल्हवनिषूदन समुद्रतोयपीतवाहन" अशी बिरुदावली कोरवून घेतली आहे. त्याचा स्वैर अनुवाद पुढीलप्रमाणे --
"क्षत्रियांचा गर्व आणि अभिमान यांचा नि:पात करणारा, शक, यवन आणि पल्लव यांचा सर्वनाश करणारा, क्षहरात घराण्याचा पराभव करून सातवाहन घराण्याची उज्ज्वल परंपरा पुन:स्थापित करणारा....."
एका अर्थाने हा महाविजय होता. पुढे दिडशे वर्ष या साम्राज्याकडे वाकड्या नजरेने पाहायचे सामर्थ्य कोणात आले नाही.
जेथे जेथे सातवाहनांचे साम्राज्य होते बव्हंशी त्याच प्रदेशांत(महाराष्ट्र, आंध्र प्रदेश आणि कर्नाटक) गुढीपाडवा साजरा केला जातो हेसुद्धा लक्षात ठेवले पाहिजे. म्हणजे लोकांची स्मृती आपल्या एका महान सम्राटालाच दरवर्षी मानवंदना देत आलीच आहे...
हा विजयोत्सव प्रजा गुढ्या उभारून साजरा करणे स्वाभाविक होते. ज्या दिवशी हा अलौकिक विजय मिलाला तो आपण गुढीपाडवा म्हनून साजरा करतो.
गुढीपाडवा साजरा करतांना गौतमीपूत्र सातकर्णी या महान सम्राटाला पुन्हा अभिवादन करुयात!

















 प्राचीन सुमेरियन देवता(प्राचीन ईराक)

प्राचीन सुमेरियन देवता(प्राचीन ईराक)
सिन ही सुमेरियाची चंद्रदेवता होती.ईस्थर(पाश्चिमात्य: व्हीनस) या देवीला तार्याच्या स्वरुपात दाखवत.त्यांच्यासाठी ईल(ईलाह) हा सर्वोच्च देव होता.सिन या चंद्रदेवतेला देवी ईस्थर आणि सुर्यदेव(शमाश) यांचा पिता दाखविले आहे.




















 प्राचीन भारतीय वेशभुषा(२००० वर्षांपूर्वी)

प्राचीन भारतीय वेशभुषा(२००० वर्षांपूर्वी)
Ancient Indian dressing (Before 2000 years ago)
संदर्भ :सांची,मध्य प्रदेश येथील शिल्प
















 ५००० वर्षांचा भारतीय वेशभूषेचा इतिहास

५००० वर्षांचा भारतीय वेशभूषेचा इतिहास
5000 years old history of Indian dressing
















राचीन सुमेरियन महिलांची वेशभूषा(प्राचीन ईराक ,४५०० वर्षांपूर्वी)


प्राचीन सुमेरियन महिलांची वेशभूषा(प्राचीन ईराक ,४५०० वर्षांपूर्वी)
Ancient Sumerian women dressing(Ancient Iraq,Before 4500 years ago






















 प्राचीन ईराकच्या वन्य जमातींचे नेतृत्त्व करणारा सडपातळ बांध्याचा, देखणा आणि धाडसी राजा

प्राचीन ईराकच्या वन्य जमातींचे नेतृत्त्व करणारा सडपातळ बांध्याचा, देखणा आणि धाडसी राजा(प्राचीन ईराक,४२०० वर्षांपूर्वी)
बऱ्याच वेळेस या मुलांना वनवास भोगावा लागला होता. उच्च वर्गाकडून झालेल्या आपल्या सुंदर आणि निष्पाप आईच्या अपमानाच बदला घेताला होता.






















 प्राचीन इराकच्या उरुक शहरातील "पशुपति" रूपातील पुरोहित राजा(५३०० वर्षांपूर्वी)

प्राचीन इराकच्या उरुक शहरातील "पशुपति" रूपातील पुरोहित राजा(५३०० वर्षांपूर्वी)
 Priest king of Uruk city depicted as master of animals(Before 5300 years)



















 प्राचीन इराकच्या उरुक शहरातील पुरोहित राजाचा पूर्ण पुतळा(५३०० वर्षांपूर्वी)


प्राचीन इराकच्या उरुक शहरातील पुरोहित राजाचा पूर्ण पुतळा(५३०० वर्षांपूर्वी)
Full statue of Priest king of Uruk city of ancient Iraq(Before 5300 years)






















 मेसोपोटेमियाच्या(प्राचीन ईराकच्या) सभ्यतेचा ३००० वर्षांचा इतिहास

मेसोपोटेमियाच्या(प्राचीन ईराकच्या) सभ्यतेचा ३००० वर्षांचा इतिहास














 राजा असुरबनीपालची सिंहासोबत लढत(प्राचीन सिरिया[/असेरिया,२६०० वर्षांपूर्वी)

राजा असुरबनीपालची सिंहासोबत लढत(प्राचीन सिरिया[/असेरिया,२६०० वर्षांपूर्वी)
King Asur-Bani-Pal fighting with lion,Ancient Syria/Assyria(Before 2600 years)
















 सुमेरियाच्या कृषक आणि पुरोहित वर्गाची आनुवंशिकता

ईतिहासकारांच्या मते सुमेरियन सभ्यतेतील कृषक वर्ग हा अनुवांशिकतेने गोऱ्या ज्यू,अरब आणि उत्तर आफ्रिकेच्या लोकांशी फार जवळ होता तर शासक वर्ग हा सावळा होता.शासक वर्गाचा कृषक समाजातील महिलांशी विवाह होऊन पुरोहितांची निर्मिती झाली.प्राचीन काळी धार्मिक विधी म्हणून राजा आणि कृषक समाजातील महिलांचे विवाह होत.जेव्हा ही सभ्यता भरभराटीस आली त्यावेळेस पुरोहित वर्गाचे वर्चस्व वाढले आणि काही वर्षातच या सभ्यतेचा अंत झाला.



















राचीन ईराक ची सुमेरियन सभ्यता(ईसवी.पूर्व. ३५००-ईसवी.पूर्व.२०००)

७००० वर्षांपूर्वी या ठिकाणी शेतीला सुरुवात झाली. ५५०० वर्षांपूर्वी उरूक या शहराची स्थापना झाली. त्याकाळी उरूक हे जगातील सर्वात प्राचीन शहर होते.त्याकाळी या शहराची लोकसंख्या ८०,००० होती. उरूक शहराची स्थापना एका अतिशय उच्च व्यक्तिमत्त्वाच्या पुरोहिताने केली होती.हा मुळात "मदन" वंशाचा एक वैदिक पुरोहित होता आणि एकेश्वरवादी होता.वेदांत कृष्णाला असुर म्हटले आहे.
मूळ वैदिक लोकांना इंद्राने भारताबाहेर हाकलले होते कारण ते इंद्राला नाकारून असुर या सर्वश्रेष्ठ देवाला मानणारे होते .वेदांत सुरुवातीला असुर हि सर्वश्रेष्ठ देवता होती परंतू नंतर मतभेद होऊन काही लोक इंद्राला मानू लागले होते .सुरुवातीला या सभ्यतेत मंदिरे नव्हती. उरूक शहरात दिवसभर आग तेवत ठेवून लोक आगीची उपासना करायचे. परंतू नंतर च्या ५०० वर्षांत या सभ्यतेत बहुदेववाद,मंदिर,पाखंड आणि देवदासी प्रथेला सुरुवात झाली.नंतर एकमेकांवरती कुरघोडी करण्यासाठी कुटील वर्गाला हाताशी धरून डावपेच वाढू लागले.पुढच्या ५०० वर्षांत अराजकता निर्माण होऊन या सभ्यतेत यादवी माजली.याच काळात अक्कड वंशाच्या सरगोन ने या सभ्यतेवरती विजय मिळविला.
४७०० वर्षांपूर्वी
गिलगमेष या महापुरुषाचा जन्म. याने या सभ्यतेला महापुरापासून वाचविले होते. त्याच्यावरती एक महाकाव्य लिहिण्यात आले. सुमेरियन ,अक्कड,असुर या चुलत भावांत नंतर वाद होऊन ते एकमेकांचे कट्टर दुश्मन झाले असले तरी त्यांचा मूळ महापुरुष एकच असल्यामुळे गिल्गमेषला सर्वच लोक मानायचे.
४५००-४००० वर्षांपूर्वी
नंतर च्या ५०० वर्षांत या सभ्यतेत बहुदेववाद,मंदिर,पाखंड आणि देवदासी प्रथेला सुरुवात झाली.नंतर एकमेकांवरती कुरघोडी करण्यासाठी कुटील वर्गाला हाताशी धरून डावपेच वाढू लागले.पुढच्या ५०० वर्षांत अराजकता निर्माण होऊन या सभ्यतेत यादवी माजली.याच काळात अक्कड वंशाच्या सरगोन ने या सभ्यतेवरती विजय मिळविला.















राचीन सुमेरियाच्या उरुक शहरातील पुरोहित राजा (५५०० वर्षांपूर्वी)

Priest king of Sumerian civilization of the city of the Uruk(BCE 3300,Ancient Iraq)




















 प्राचीन इराकच्या सुमेरियन सभ्यतेतील लगाश शहरातील शासक आणि पुरोहित


 प्राचीन इराकमधील कुटील वर्ग


"एन्सी" हा कुटिल वर्ग प्राचीन इराकच्या लगाश शहरात शासक झाला होता.काही सुमेरियन शासकांनीच हा वर्ग तयार केला होता. सुमेरियन शासक सावळे होते मात्र हा वर्ग गोरा होता. या ठिकाणी निळे डोळे हे प्रतिकात्मक आहेत.











 प्राचीन ईराक मधील "सिमू-रम" या पहाडी जमातीचा राजा ईडीन-सिन(४००० वर्ष पूर्व)




सिन-हि प्राचीन ईराक मधील चंद्र-देवता होती.याच्या एका हातात परशू आणि एका हातात धनुष्य दिसत आहे.त्याची तुलना चंद्रदेवतेशी केली जात असे.




















 प्राचीन ईराकमधील ४५०० वर्षांपूर्वीची सुमेर सभ्यतेतील राजकुमारी


4500 years old statue of the princess of Sumerian civilization of ancient Iraq .


















 गिलगमेष: प्राचीन महापुरुष आणि एक खंबीर नेतृत्त्व

गिलगमेष चा काळ दहाहजार वर्षांच्या हि अगोदरचा आहे.यांनी सभ्य मानवांच्या समूहाला ज्यांनी या जगाची सभ्यता घडविली त्यांना महाप्रलयापासून वाचविले होते.
Before 10,000 years ago mighty Gilgmesh saved humans of civilized race from big flood.




















 भारतात वैदिक पुरोहितांचे महत्त्व कमी होण्याची कारणं


जैन आणि बौद्ध या अवैदिक धर्मांच्या वाढत्या प्रभावांमुळे भारतात शाकाहाराचे महत्त्व वाढू लागले. त्यामुळे यज्ञ आणि पशुबळींचे प्रमाण फार कमी झाले. हिंदू पुरोहित पण जैन आणि बौद्ध या अवैदिक परंपरेतील भिक्षुंप्रमाणे डोक्याचे मुंढन करू लागले.फक्त शेंडी किंवा शिखा हा प्रकार ठेवून त्यांच्यापेक्षा थोडेसे वेगळेपण निर्माण करण्यात आले. यज्ञ आणि पशुबळींपेक्षा तत्वज्ञान आणि गणिताचा अभ्यास या विद्वत्ता मानल्या जाणाऱ्या बाबींवर जास्त भर देण्यात आला. असे असली तरी ग्रामीण भागात मात्र पशुबळी सुरूच होते मात्र यज्ञात दिल्या जाणाऱ्या पशूंच्या अगणित बळीपेक्षा हि संख्या फार कमी झाली. एका घरात एकाच पशुची बळी देण्याची प्रथा सुरु झाली आणि यज्ञ बंद झाले.
नंतर मुस्लिम धर्म निर्माण झाल्यावरती कस्सी पुरोहित मुस्लिमांचे पुरोहित बनले. प्राचीन काळी आमच्यात आणि कस्सी पुरोहित यांच्यात विवाह होत. आमच्या वाडीत अजूनसुद्धा मुस्लिम पुरोहिताशिवाय बोकडाचा बळी मान्य होत नाही.




















 वैदिक पुरोहितांचा प्राचीन संस्कृतीतील मान आणि भारतातील त्यांच्या अधोगतीची कारणे


कस्सी किंवा कट्टी हे मूलतः वैदिक "होतार" पुरोहित होते . यांचा १०,००० वर्षांचा इतिहास आहे. प्राचीन भारतीय संस्कृतीत यांच्याशिवाय यज्ञ आणि पशुबळी मान्य होत नसे.नंतर मुस्लिम धर्म निर्माण झाल्यावरती मुस्लिमांचे हे पुरोहित बनले.आजही आमच्या वाडीत मुस्लिम पुरोहितांशिवाय बोकडाचा बळी मान्य होत नाही. प्राचीन काळी यांच्यात आणि आमच्यात विवाह होत.

भारतात वैदिक पुरोहितांचे महत्त्व कमी होण्याची कारणं
जैन आणि बौद्ध या अवैदिक धर्मांच्या वाढत्या प्रभावांमुळे भारतात शाकाहाराचे महत्त्व वाढू लागले. त्यामुळे यज्ञ आणि पशुबळींचे प्रमाण फार कमी झाले. हिंदू पुरोहित पण जैन आणि बौद्ध या अवैदिक परंपरेतील भिक्षुंप्रमाणे डोक्याचे मुंढन करू लागले.फक्त शेंडी किंवा शिखा हा प्रकार ठेवून त्यांच्यापेक्षा थोडेसे वेगळेपण निर्माण करण्यात आले. यज्ञ आणि पशुबळींपेक्षा तत्वज्ञान आणि गणिताचा अभ्यास या विद्वत्ता मानल्या जाणाऱ्या बाबींवर जास्त भर देण्यात आला. असे असली तरी ग्रामीण भागात मात्र पशुबळी सुरूच होते मात्र यज्ञात दिल्या जाणाऱ्या पशूंच्या अगणित बळीपेक्षा हि संख्या फार कमी झाली. एका घरात एकाच पशुची बळी देण्याची प्रथा सुरु झाली आणि यज्ञ बंद झाले.

नंतर मुस्लिम धर्म निर्माण झाल्यावरती कस्सी पुरोहित मुस्लिमांचे पुरोहित बनले. प्राचीन काळी आमच्यात आणि कस्सी पुरोहित यांच्यात विवाह होत. आमच्या वाडीत अजूनसुद्धा मुस्लिम पुरोहिताशिवाय बोकडाचा बळी मान्य होत नाही.














http://vinaykumarmadane.blogspot.com/search?updated-max=2020-03-19T05:27:00-07:00&max-results=7&start=21&by-date=false


Kanva Dynasty - Eighth ruling dynasty of Magadha

The ruins of the Mauryan Empire that were taken over by the Shungas, were now in the hands of Kanvas. Kanvas succeeded the Shungas after the latter ruled for about 112 years. 

Accession of Throne


The last Shunga King Devabhutti was murdered by the hands of daughter of Devabhuti’s slave who was disguised as the Queen

The last Shunga king Devabhuti was very much fond of the company of his women and eventually this became the reason of his death. His murder was conspired by one of his ministers Vasudeva Kanva. The king was murdered by the hands of daughter of Devabhuti’s slave who was disguised as the Queen. All this happened in the supervision and on the orders of Vasudeva Kanva. After all this, he ascended the throne in 73 BCE. 

Some of the sources also suggest that the Kanvas were the servants of Shungas and when the Shunga princes became weak, the Kanvas took over the power and ruled as the Peshwas in the modern time. The dynasty of their masters – Shunga dynasty, was not uprooted but reduced to the nominal position. But this angle of the history has not been widely accepted as the historians like Raychaudhuri and Dr. Smith believe that Kanvas cannot be the contemporary to the Shungas. 

There has been relatively very limited information about the Kanvas that we derive from the historical sources. 

About Kanva Rule


Kanvas ruled a small part of the Indian territory of ancient India. The land on which they were ruling was even less than that of ruled by the Shungas. Punjab had been occupied by the Indo-Greeks. A huge part of the Gangetic plains was ruled by Mitra Kings. Vidisha, the capital of the Shungas was still ruled and governed by some of the unknown descendants of Shungas. It seems that they were just confined and limited to Magadha alone as most of the feudatories had declared their independent positions or were invaded by the neighbouring kingdoms. 

The controversy about the coins of the Kanva dynasty has also been there. Certain coins have been found bearing the name of the legend Bhumimitra, who was one of the Kanva rulers. But this assumption has not been accepted by the Numismatics as it regards these coins as local issues.


Issues Faced by Kanvas


The effort that the Kanvas received in inheritance from the Shungas was to protect its existence and to prevent it from the demolition. The challenges related to the disintegration of the empire were already faced by the later Shungas when the feudatories were seperating and announcing their independence. Kanvas needed a strong position if they wanted to protect the territorial integrity but did not get enough time in the administration that a stable administration with the strong army could be managed. 

Further, the challenges that Kanvas had to face was the threat from the foreign invaders as well as from the indigenous kingdom. Both of the parties were just waiting for the right opportunity to conquer the rich land of Central India. The armies of the Mitra dynasty, Satavahana Kingdom and the Indo-Greeks were ever ready to capture the land of Magadha. At the end, the Satavahana army managed to defeat and demolish the Kanva Dynasty as well as the last remains of the Shunga Empire, taking the full control of Magadha.

Rulers of Kanva Dynasty


The first ruler and the founder of the Kanva Dynasty was Vasudeva Kanva, under whose gotra the empire was named. He was succeeded by Bhumimitra, the king whose name has been found on the coins. He ruled for 14 years and was succeeded by Narayana, who ruled for 12 years. 

The last ruler of the Kanva dynasty was Susarman, who was killed by Balipuccha (founder pf the Satavahana Kingdom) after his rule of about 10 years

Aftermath


It is believed that the conquest of Magadha by Satavahanas was not the permanent one. The reason being that no coins or any of the archaeological evidence regarding the Satavahana rule has been found in archaeological sites of Magadha. Also, the has been no evidence of any of the Satavahana king claiming the lordship over Magadha.

Probably after a short period of time, Magadha was left on its own by the Satavahanas and was ruled by the neighbouring Mitra kings who had a continuous eye on the region. 

It was later during the time of Guptas that the Magadha region regained its prevalence. 





Origin of the Vijayanagara Empire


According to the ancestry of the Vijayanagara Empire, two theories have been put forth. One of them claims that the Hoysala Empire's founders, Harihara I and Bukka I, were Kannadiga commanders stationed in the Tungabhadra area to fend off Muslim incursions from Northern India. Another story holds that following the collapse of the Hoysala Empire, the Telugu people known as Harihara and Bukkaraya acquired control of the northern regions. Originally connected to the Kakatiya Kingdom. They were thought to have been taken prisoner by Ulugh Khan's forces in Warangal.

But the commonly believed historical fact is that the Hoysala, Kakatiya, and Yadava Hindu kingdoms were succeeded by the Vijayanagara Kingdom, which was established in 1336 CE. This added another layer of opposition to the Muslim conquests of South India.

By 1336, the forces of Sultans Alauddin Khalji and Muhammad bin Tughluq of the Delhi Sultanate had conquered the upper Deccan area, which includes modern-day Maharashtra and Telangana.


Territory under Tughlaq dynasty of Delhi Sultanate, 1330-1335 AD

Source: Maps created from DEMIS Mapserver, which are public domain. Koba-chanTerritorial area: पाटलिपुत्र (talk), per Schwartberg Atlas p.148, CC BY-SA 3.0 via Wikimedia Commons

The Overthrow of the Khalji Dynasty


The governor of Dipalpur, Ghazi Malik (Ghiyath al-Din Tughluq), refused to recognise Khusrau Khan's ascendancy. He did not, however, take immediate action to obstruct the ascent since he was aware of the military might of the adversary. Fakhruddin Jauna, the akhur-bek in Khusrau Khan's administration and the son of Tughluq was dissatisfied with Delhi's leadership. He called a secret gathering of his allies, and on their recommendation, he asked his father for assistance in overthrowing Khusrau Khan.

Khusrau Khan's advisors counselled him to take action to thwart any future plots and destroy possible heirs to the throne as Tughluq built a larger army and acquired greater support. As a result, Khusrau Khan gave the order to have Alauddin's three sons, Bahauddin, Ali, and Usman, who had been blinded and imprisoned previously, killed.

BACKGROUND


The Southern end of the Indian peninsula situated south of the Krishna River was divided into three kingdoms- Cholas, Cheras, and Pandyas. The Chola kingdom, also called Cholamandalam, was situated to the North-East of the territory of the Pandyas, between the Pennar and the Velar rivers. Their chief source of power was centred at Uraiyur which was famous for cotton trade. The Chola capital was situated at Kaveripattanam which was a great centre of trade and commerce and probably had a large dock. Perhaps a Chola king named Elara conquered and ruled over Sri Lanka in the mid second century BCE for nearly 50 years. However, a clear history of the Cholas begins with their famous ruler Karikala in the second century CE. He founded the city of Puhar which is coterminous with Kaveripattanam.

Under Karikala’s successors, Chola power rapidly declined and their capital Kaveripattanam was destroyed. The Chola power was almost wiped out by the attacks of the Pallavas from the north. They re-emerged in the ninth century CE.

Khalji Dynasty
Territory controlled by the Khaljis circa 1320

Source: Maps created from DEMIS Mapserver, which are public domain. Koba-chanTerritorial area: पाटलिपुत्र (talk), per Schwartberg Atlas p.148, CC BY-SA 3.0 via Wikimedia Commons

The origin of the Khalji Dynasty


The Khaljis were in the position of minister or vassal under the Mumluk dynasty, who probably came to India during the Balban period and rose to an important position under the later Sultans. The founder of the Khalji dynasty was Jalal-ud-din Khalji. Jalal-ud-din was in service of Balban’s son – Bughra Khan. Under him, Jalal-ud-din rose as the commander of North-western India keeping Samana as the headquarters. Soon after the coronation of King Qaiqabad, Jalal-ud-din was called from Samana and appointed as ariz-i-mumalik and made the governor of Baran.

As Qaiqabad was paralysed, Malik Surkha and his associate Malik Kachhan decided to appoint the infant son of Qaiqabad, Kayumars as the Sultan. These two nobles even conspired against all the other rival nobles and planned their murder, including that of the Jalal-ud-din Khalji. But their conspiracy backfired, the rival ministers were killed, and Jalal-ud-din was made the regent of young sultan Kayumars. As Qaiqabad died, Kayumars was deposed by Alauddin and the throne was acquired.

Shishunaga, Dynasty, Kalakosha
Approximate extent of the Shishunaga dynasty

Source: Schwartzberg, J. E. (1992), A Historical Atlas of South Asia: University of Oxford Press Background. Made with GIMP CC BY-SA 3.0

Shishunaga


One of the major rulers of that dynasty was Shishunaga, who ruled the kingdom from Vaishali after deposing the former Haryanka ruler Nagadhakashaka and moved the capital to Vaishali from Pataliputra. He initially started as the governor of Varanasi or as an officer in the government. According to mahavamsatika purana, it is also said that he was son of former Licchavi ruler of Vaishali and was made governor by Nagadhakshaka. His major achievement was the conquest and defeat of Pradyota dynasty of Avanti. He made his son Kalakosha also known as kakavarna, the governor of Varanasi. He later succeeded him and also defeated Vatsa and Kosala.

https://historyunravelled.com/kingdoms/shishunaga-dynasty--fourth-ruling-dynasty-of-magadha

































No comments:

Post a Comment

मनसर

 प्रकार : गिरीदुर्ग जिल्हा : नागपुर उंची : १२०० फुट ...