इंडोनेशिया
इंडोनेशिया हा एक जगावेगळा देश आहे... ५० लाख चौ किमी पाण्याच्या क्षेत्रात सर्व मिळून २० लाख चौ किमी जमिनीचे क्षेत्रफळ असलेल्या १७,००० पेक्षा जास्त बेटांनी तो बनलेला आहे.
त्यातले सर्वात मोठे बोर्निओ नावाचे ७,४३,३३० चौ किमी क्षेत्रफळाचे आणि दोन कोटी लोकवस्ती असलेले जगातले तीन क्रमांकाचे बेट आहे तर अनेक लहान बेटे म्हणजे केवळ समुद्राच्या पाण्यातून जेमतेम काही सेंटिमीटर वर डोके काढणारी प्रवाळ बेटे आहेत.
इंडोनेशियाच्या पश्चिम किनाऱ्यावरच्या आचे प्रांताची (तोच तो, जो २६ डिसेंबर २००४ ला तेथे झालेल्या भूकंपामुळे आणि भारतच नव्हे आफ्रिकेच्या किनाऱ्यापर्यंत पोहोचलेल्या त्सुनामीच्या लाटांमुळे कुप्रसिद्ध झालेला भूभाग) सीमा भारतातील निकोबार बेटसमूहापासून केवळ २०० किलोमीटरच्या आसपास आहे तर पूर्वेकडच्या पापुआ या प्रांताची सीमा रेखांशांत पाहिली तर जपानच्या पूर्व सीमेच्या बरोबरीने उभी आहे ! हे पूर्वपश्चिम अंतर साधारण ५००० किमी चे आहे आणि त्यामुळे या देशात तीन स्थानीक प्रमाणवेळा आहेत.
इंडोनेशियाच्या उत्तरेला असलेल्या समुद्रापलीकडे ब्रह्मदेश, मलेशिया, थायलंड, कंबोडिया, व्हिएतनाम, फिलिपाईन्स, चीन, दोन कोरिया, जपान, इत्यादी देशांची साखळी आहे; तर दक्षिणेकडे भारतीय महासागर आणि ऑस्ट्रेलिया खंडाचा जवळ जवळ दोन तृतियांश भाग आहे. इतका या देशाचा पूर्व ते पश्चिम आवाका आहे !

इंडोनेशिया (मूळ नकाशा जालावरून साभार)
३३ प्रांतांत विभागलेल्या या देशाची २४ कोटी लोकसंख्या जगातील तीन क्रमांकाची आहे. जगातील एका देशातील सर्वात मोठी मुस्लिम लोकसंख्या (२१ कोटी) या देशात आहे.
अश्या या वैशिष्ट्यपूर्ण देशात अजून एक जगप्रसिद्ध विशेष आहे... त्याचा एक छोट्या आणि इतर काही अगदी छोट्या बेटांनी बनलेला बाली प्रांत. या बाली प्रांताचे वैशिष्ट्य नीट समजण्यासाठी आपल्याला इंडोनेशियाच्या ऐतिहासिक आणि भैगोलिक जडणघडणीचा थोडासा परिचय आवश्यक आहे.
चीन आणि भारत व भारतापलीकडील आफ्रिका-मध्यपूर्वेतील देशांबरोबरच्या प्राचीन जलव्यापाराच्या मार्गाचा मोठा आणि मोक्याचा भाग इंडोनेशियाच्या ताब्यातल्या पाण्यातून जात असे. त्यामुळे सातव्या शतकापासून इंडोनेशियातील साम्राज्यांचे या व्यापारात अनन्यसाधारण महत्त्व होते. व्यापाराबरोबर प्रथम हिंदू, नंतर बौद्ध आणि शेवटी मुस्लिम धर्माचा प्रसार येथे झाला.
सातव्या शतकात हिंदू असलेल्या प्रबळ दर्यावर्दी श्रीविजय साम्राज्याच्या ताब्यात हा व्यापार होता. आठव्या शतकात शेतीने समृद्ध झालेल्या हिंदू मातरम् आणि बौद्ध शैलेन्द्र घराण्यांची सत्ता तेथे होती. मातरम् सम्राटांनी प्रम्बानन देवळांची तर शैलेंद्र सम्राटांनी जगातील सर्वात मोठ्या बोरोबुदूरच्या स्तूपाची रचना केली. तेराव्या शतकाच्या शेवटाला उत्तर जावामध्ये गजमद नावाच्या राजाने हिंदू महापहित साम्राज्य स्थापन केले. आधुनिक इंडोनेशियाच्या बहुतेक सर्व भूभागावर या साम्राज्याचा विस्तार झाला होता.
तेराव्या शतकात सुमात्रा बेटाच्या पश्चिमोत्तर टोकाला सुरुवात होऊन सोळाव्या शतकापर्यंत बहुतेक सर्व इंडोनेशिया मुस्लीमबहुल झाला होता. याला एकच अपवाद म्हणजे बाली बेट, जे आजतागायत हिंदूबहुल आहे. इजिप्तमधिल चर्चमध्ये असलेल्या बाराव्या शतकातील लिखाणांत सुमात्राच्या पश्चिमोत्तर टोकावरील बारूस येथे चर्च असल्याचा उल्लेख आहे. इंडोनेशियात मोठ्या प्रमाणात ख्रिश्चन धर्म मुख्यतः पोर्तुगिज आणि डच वसाहतवाद्यांनी आणला. त्यांचा धर्म जरी तेथे प्रबळ झाला नाही तरी इंडोनेशियाला साडेतीनशे वर्षे वसाहतवादाच्या खोड्यात जखडून ठेवण्यात मात्र डच सफल झाले.
मुस्लिमबहुल असला, रोमन लिपी अंगिकारली असली आणि देशात एकूण ७४२ भाषा व उपभाषा असल्या तरी सर्वमान्य इंडोनेशियन भाषेवर प्राचीन भारतीय संस्कार अजूनही बऱ्यापैकी टिकले आहेत. या देशाचे बोधवाक्य "Bhinneka Tunggal Ika (भिन्नेका तुंगाल इका)" म्हणजेच " अनेक, परंतु एक" किंवा "युनिटी इन डायव्हर्सिटी" असे आहे. त्यांच्या एका राष्ट्रपतिंचे नाव सुकार्नोपुत्री (सुकार्नोची मुलगी) असे होते. या भाषेत बरेच संस्कृत शब्द मूळ रूपात आणि अपभ्रंशित रूपात दिसतात. इथले चलन रुपिया आहे. एक भारतीय रुपया म्हणजे साधारण २०० इंडोनेशियन रुपिया.
गणेशाचे चित्र असलेली २०,००० इंडोनेशियन रुपियाची नोट (जालावरून साभार)
भारतिय नागरिकांना इंडोनेशियाच्या विमानतळावर अथवा बंदरावर
पोहोचल्यावर ३० दिवसांचा पर्यटक "व्हिसा ऑन अरायव्हल" मिळतो. त्यासाठीच्या
आवश्यक अटींची इंडोनेशियाच्या सरकारी संस्थळावरची माहिती खालीलप्रमाणे:
१. आगमनाच्या तारखेपासून कमीत कमी ६ महिने वैध असलेले पारपत्र.
२. परतीचे तिकीट
३. रोख व्हिसा फी: USD 25
टीपः व्हिसाचे नियम बदलू शकतात. प्रवासापूर्वी एंबॅसीत अथवा त्यांच्या
संस्थळावर चौकशी करून त्यावेळेचे नियम माहीत करून घेणे आवश्यक आहे,
हेवेसांन.
बाली
इंडिनेशीयाच्या बाली प्रांताचे अनेक विशेष आहेत, त्यातील काही महत्त्वाचे खालीलप्रमाणे:
१. बालीच्या चाळीस लाख लोकसंख्येपैकी ८५% जनता हिंदू आहे.
२. इंडोनेशियाच्या पर्यटन व्यवसायाच्या उत्पन्नात या छोट्या बेटाचा सिंहाचा वाटा आहे.
३. बाली बेट त्याचे नैसगिक सौंदर्य, सुंदर सागरकिनारे, प्रवाळ बेटे, प्राचीन हिंदू मंदिरे, पारंपरिक नृत्यकला, दगड-लाकूड-कातडे-धातूंवरची कलाकुसर यामुळे जगातल्या सर्वोत्तम पर्यटन स्थळांमध्ये गणले जाते...

बाली (जालावरून साभार)
बालीमधिल मानवी वसाहतीची सुरुवात दक्षिणपूर्व आशियातील आणि ओशियानियातील लोकांच्या स्थलांतराने झाली असावी असे पुरातत्वशास्त्रिय पुरावे दर्शवितात. बालीच्या लोकांमधिल Y-क्रोमोसोम्सपैकी ८४% ऑस्ट्रेनेशियन वंशाचे, १२% भारतीय वंशाचे आणि २% मेलॅनेशियन वंशापासून आलेले आहेत. प्राचीन बालीत पाशुपत, भैरव, शिव शिदान्त (शिव सिद्धान्त), वैष्णव, बोधा, ब्रह्म, रेसी (ऋषी), सोरा, गाणपत्य असे नऊ हिंदू संप्रदाय होते. सद्या बाली हिंदूंत सुद्रा (शुद्र), वेसिया (वैश्य), क्सत्रियास (क्षत्रिय) आणि ब्राच्मन (ब्राम्हण) अश्या चार जाती मानल्या जातात. मात्र या जातींमध्ये रोटीबेटीचे व्यवहार भारतापेक्षा खूपच जास्त सहजपणे होतात.
बालीत घराच्या आवारात देव आणि पूर्वजांच्या नावाने देवळे बांधण्याची प्रथा आहे. त्यामुळे या छोट्या बेटावर सार्वजनिक आणि घराशेजारची अशी सर्व मिळून २०,००० च्या आसपास देवळे (पुरा) आहेत. यावरून त्याला "हजार देवळांचे बेट (Island of a Thousand Puras)" आणि "देवांचे बेट (Island of the Gods)" अशी नावे पडली आहेत.
पहिल्या शतकापासून बाली संस्कृतीवर मुख्यतः भारतीय आणि काही प्रमाणात चीनच्या संस्कृतीची छाप आहे. इ स ९१४ मध्ये श्री केसरी वर्मदेव याने स्थापन केलेल्या ब्लांजोंग स्तंभावर आणि इतर अनेक शिलालेखातही "बालीव्दीप" हे नाव आढळते. याच काळात येथे "सुबक" या नावाच्या गुंतागुंतीच्या जलसिंचन प्रणालीवर आधारलेली भातशेती सुरू झाली. या काळातल्या रीतीभातींची छाप आजही तेथिल जनजीवनात जिवंत आहे.
जावामधील हिंदू महापहित साम्राज्याने (१२९३ - १५२०) इ स १३४३ मध्ये बालीवर आधिपत्य स्थापन केले. हे साम्राज्य विलयाला जाऊन मुस्लिम प्रभाव वाढायला लागल्यावर आपल्या मूळ संस्कृतीची जपणूक करण्यासाठी तेथील हिंदू बुद्धिमंत, धर्मोपदेशक, कलाकार इत्यादींनी बालीमध्ये स्थलांतर केले. सर्व बाजूंनी मुस्लिम संस्कृतीने वेढले गेल्यामुळे या बेटाची भारताशी असलेली सांस्कृतिक नाळ ५०० वर्षांपूर्वी तुटली. त्यामुळे तिथल्या आणि भारतातल्या आताच्या हिंदू संस्कृतींत बराच फरक पडला आहे. बालीतला हिंदू धर्म एकेश्वरी आहे, मुख्य देव "संघयांग विदी वसा" किंवा "अचिंत्य" असून इतर सर्व (विष्णू, शिव, इ) देव त्याचीच रुपे / अवतार समजले जातात. अचिंत्यची मूर्ती नसते. त्याऐवजी एका रिकाम्या सिंहासनाची स्थापना केली जाते. त्याभोवती पोलेंग नावाचे पांढऱ्या-काळ्या चौकड्यांचे वस्त्र लुंगीसारखे गुंडाळले जाते आणि त्यावर तेदुंग नावाची नक्षीदार छत्री असते. या सिंहासनावर देवांना अर्पिलेला प्रसाद व फुले ठेवली जातात. धर्माचरणामध्ये हिंदू देवांबरोबरच बुद्ध, पुर्वज, पंचमहाभूते आणि निसर्ग यांनाही महत्त्वाचे स्थान आहे. त्यांचीही अशीच देवळे बांधली जातात. त्यामुळे एकाच आवारात शेजारी शेजारी पाच-दहा सिंहासने असणे बालीत एक सामान्य गोष्ट आहे...
"अचिंत्य"चे सिंहासन
अचिंत्यची मूर्ती नसली तरी त्याची कसर बालीच्या कसलेल्या कारागीरांनी देवळातील आणि घरांतील अनेक कोरीवकामांनी आणि इतर कलाकृतींनी भरून काढली आहे.
मनमोहक निसर्गसौंदर्याने भरलेल्या या देशात पर्यटक वर्षभर गर्दी करतात. ते जेवढे बालीच्या समुद्रकिनाऱ्यांची आणि प्रवाळ बेटांची मजा उपभोगायला येतात तेवढेच ते बालीचे ज्वालामुखी व हिरवाईने नटलेले नैसर्गिक सौंदर्य; सुंदर देवळे व आकर्षक सांस्कृतिक वारसा; आणि कसलेल्या कारागिरांच्या कलाकुसरीने नटलेल्या कलावस्तू यांनी आकर्षित होऊन येतात.
बालीला २०१० मध्ये Travel and Leisure कडून जगातले सर्वोत्तम बेट हा किताब मिळाला आहे. २०११ मध्ये BBC Travel ने बालीला ग्रीस खालोखाल जगातले दुसरे सुंदर बेट म्हणून नावाजलेले आहे. भारतीय संस्कृतीशी नाते सांगणाऱ्या या बेटाला दरवर्षी ८० लाखांवर पर्यटक भेट देतात. मात्र त्यांत भारतीयांची संख्या नगण्य असते. परदेशी पर्यटकांत मुख्यतः ऑस्ट्रेलिया, फ्रांस, चीन, जर्मनी आणि अमेरिकन नागरिकांचा भरणा असतो.
एलिझाबेथ गिलबर्टच्या या अमेरिकन लेखिकेच्या स्वतःच्या अनुभवांवर आधारलेल्या Eat, Pray, Love या प्रसिद्ध (No. 1 spot on the New York Times paperback nonfiction best-seller list) कादंबरीत तिच्या इटली (जिथे तिने भरपूर पास्ता खाल्ला), भारत (जिथे तिने देवाची खूप आराधना केली) आणि बालीतल्या (मीच सगळे सांगायला पाहिजे काय?... कादंबरी वाचा किंवा चित्रपट पहा ;) ) वास्तव्याचे वर्णन आहे. त्या कादंबरीवर बेतलेला त्याच नावाचा जुलिया रॉबर्ट्सने एलिझाबेथचे काम केलेला चलत्चित्रपटही खूप गाजला होता.
चला तर, जाऊया या देवांच्या बेटाच्या सफरीवर...
===================================================================
बालीसंबधी माहिती फार पूर्वी वाचली आणि तेव्हापासून तेथे जायची उत्सुकता लागली होती. त्यामुळे जेव्हा विमान बाली बेटाजवळ पोहोचले तशी ती शिगेला पोहोचली. जसजसे विमान खाली येऊ लागले आणि राजधानी देनपसारचे दर्शन होऊ लागले तसे बाली आपल्या प्रसिद्धीला जागणार आहे याची खात्री पटू लागली...
बालीचे प्रथमदर्शन : ०१ : देनपसारचे विहंगम दृश्य
बालीचे प्रथमदर्शन : ०२ : देनपसारचे विहंगम दृश्य
बालीचे प्रथमदर्शन : ०३ : देनपसारचे विहंगम दृश्य
बालीचे प्रथमदर्शन : ०४ : देनपसारचा आंतरराष्ट्रीय विमानतळ
विमानतळाबाहेर आमचा मार्गदर्शक पारंपरिक वेषात वाट पाहत उभा होता. त्याचे नाव आय गुस्ती पुतु कार्तिक (I Gusti Putu Kartika) त्याच्या नावातला "आय" म्हणजे कुटुंबातील सर्वात मोठा मुलगा आणि "गुस्ती" हा शब्द तो बालीच्या राजघराण्यातील असल्याचे निदर्शक आहे. कार्तिक शिक्षणक्षेत्रात नोकरी करतो आणि मार्गदर्शकाचे काम स्वतःची आवड व अधिक उत्पन्नाचे एक साधन म्हणून करत असतो. त्याच्या हसर्या आणि खेळकर स्वभावाने आमचे बालीतील वास्तव्य फारच मजेत गेले...
आमचा मार्गदर्शक कार्तिक, त्याच्या नेहमीच्या स्मितहास्यासह
विमानतळाच्या आवाराच्या बाहेर पडता पडता हे बालीतले पारंपरिक व्दार दिसले...
बालीचे पारंपरिक व्दार
हे व्दार म्हणजे दुभंगलेला मेरू पर्वत आणि त्यातून पुढे गेल्यावर देवलोक (आणि शुभ काळ) सुरू होतो असा इथे समज आहे. त्यामुळे सर्व देवळांच्या, मोठ्या इमारतींच्या आणि मोठ्या खाजगी घरांच्या आवारांचे मुख्य व्दार याच शैलीत बांधलेले असते.
देनपसार इतक्या वेगाने वाढत आहे की तेथील रस्ते आता खूपच अपुरे पडू लागले आहेत हे काही मिनिटांतच ध्यानात आले...
बालीचा रस्ता
आणि काही वर्षात ते इतर आधुनिक शहरांसारखे काँक्रीटचे जंगल बनून आपले नैसर्गिक सौंदर्य हरवून बसेल की काय अशी भिती वाटली.
पुरी सरोन या देनपसारच्या सेमिनयाक नावाच्या उपनगरातील हॉटेलमध्ये पोचलो. पारंपरिक कोरीवकामाने आणि सुंदर पुष्परचनेने सजलेला स्वागतकक्ष पाहून मन प्रसन्न झाले...
पुरी सरोन, सेमिनयाक : स्वागतकक्ष
हॉटेलचे आवारही सुंदर होते. एका बागेत अनेक लहानमोठ्या इमारतींत राहायची व्यवस्था होती...
पुरी सरोन, सेमिनयाक : आवाराचे प्रथमदर्शन
मात्र जेव्हा आम्हाला दिलेली खोली पाहिली तेव्हा निराशा झाली. खोलीचे एकंदरीत रूपरंग काही ठीक वाटले नाही. शिवाय आम्ही बुक केलेल्या स्तरापेक्षा ती खूपच कमी दर्जाची होती. परत रिसेप्शनवर येऊन तक्रार केली. तेथील कर्मचार्यांनी असमर्थता व्यक्त करून मॅनेजरशी बोला असे सांगितले. मॅनेजरशी पंधरा मिनिटे चर्चा होऊनही काही उपाय निघत नाही असे बघून, "आमच्या भारतातल्या टूर कंपनीशी बोलतो. योग्य खोली दिल्याशिवाय इथे राहणार नाही." असा निर्वाणीचा इशारा दिल्यावर मॅनेजरची वागणूक जरा नरमाईची झाला. तो आत जाऊन कोणाशीतरी चर्चा करून परत आला आणि म्हणाला, "दुसर्या खोल्या दाखवतो. त्यातली पसंत करा." या तोडग्यामधून एक बागेकडे व्हरांडा असणारी खोली पसंत पडली आणि मॅनेजर व आम्ही दोघांनीही हुश्श म्हटले !
आम्ही दोन एक तासाने सुरू होणार्या भटकंतीआधी थोडा आराम करायला आडवे झालो !
(क्रमशः )
इंडोनिशिया, व्हियेतनाम आणि थायलंडला जायला व्हिसा लागतोच का?
की, ऑन अरायव्हल विसा मिळू शकतो?
या देशांच्या व्हिसाची सद्याची अवस्था अशी आहे:
१: इंडोनेशिया: व्हिसा ऑन अरायव्हल
२. व्हिएतनामः ऑनलाईन व्हिसा
३. थायलंडः स्थानिक देशाच्या एंबॅसीतून व्हिसा घेणे आवश्यक
मला वाटतं त्या साठि तुमच्या पारपत्राची कॉपी, एक फोटो आणि १००० भात (थायी चलन) आवश्यक आहे. तसंहि बहुतेक पर्यटक त्यांच्या देशाच्या एंबसीतुन व्हिसा घेउन आल्यामुळे ह्या ऑन अराव्हयल व्हिसाच्या काउंटरवर फार कमी गर्दि असते. सहकुटुंब एकदा नक्कि थायलंडला भेट द्या. फार स्वस्तात टुर होते. खासकरुन पुखेत तर फारच सुंदर आहे. मी ह्या भटकंती वरचे काहि फोटो टाकले होते अर्थात ते नुसते फोटो आणि माफक वर्णन आहे. एक्का साहेबांसारखा काय आपला अभ्यास नाहि. त्या सफरीचे अजुन दोन भाग टाकायचे आहेत. बघु कधी मुहुर्त निघतोय ते.
थायलंडला पण ओन अरायव्हल विसा मिळतो (साधारण १८००/- रु खर्च होतो आणि ३० मिनिटात काम होते (डायरेक्ट फुकेत ला गेलात तर १५ मिनिटात पण काम होते )
ताजेतवाने होऊन हॉटेलच्या स्वागतकक्षात आलो. कार्तिक तयारच होता. आम्ही फेरफटक्यासाठी बाहेर पडलो. पाच मिनिटांचा प्रवास झाला असेल नसेल, या कलाकृती दिसल्या आणि थांबून फोटो काढल्याशिवाय राहवले नाही...
एका प्रवेशव्दाराजवळच्या कलाकृती
गरूडावर आरूढ विष्णू
असुर
या प्रकाराची शिल्पे सर्व बालीभर सतत दिसतात. मंदिरांची, रिसॉर्ट्सची आणि मोठ्या इमारतींची आवारे व व्दारे तसेच सर्व मोठे चौक तेथील आखीव रेखीव आणि सौंदर्यपूर्ण शिल्पांनी सजवलेले आहेत. एक विशेष म्हणजे उघड्यावरची दगडी शिल्पे घासून पुसून साफ न करता त्यांच्यावर नैसर्गिकपणे वाढलेले शेवाळ तसेच ठेवले जाते. हाच प्रकार देवळातल्या देवांच्या सिंहासनांच्या बाबतीतही असतो.
अजून एक विशेष म्हणजे बालीत केवळ देवांचेच पुतळे आहेत असे नाही. तितकेच किंवा कदाचित त्यापेक्षा जास्त संखेने देवळांच्या आणि इमारतींच्या व्दारांचे संरक्षण करणार्या असुराचे पुतळे आहेत. म्हणजे सुर विरुद्ध असुर असा संघर्ष दिसण्यापेक्षा हे एक प्रकारचे सुरासूर सहजीवन असल्यासारखेच दिसते ! मात्र असुरांच्या पुतळ्यांना देवळाच्या आवारांत अथवा चौकाच्या मध्यभागातले मानाचे स्थान मिळत नाही. या सर्व मूर्तींचे आकार त्यांच्या वापराप्रमाणे लहानमोठे असतात... १५-२० सेंटिमीटर उंचीच्या इमारतींच्या आतल्या शोभेच्या मूर्तींपासून ते उघड्या आकाशाखालच्या दोन किंवा जास्त मीटर उंचीच्या मूर्ती दिसतात.
घरात ठेवण्यासाठी बनविलेल्या मूर्तींसाठी दगडाशिवाय लाकूड, कातडे आणि वेगवेगळ्या धातूंचाही वापर केला जातो. अश्या प्रत्येक माध्यमावर प्रावीण्य असलेल्या कलाकारांची वेगवेगळी गावे आहेत. त्यांना भेट देणे हे बाली पर्यटनातील एक आकर्षण आहे. यातील काही प्रसिद्ध गावांना आपण आपल्या भटकंतीत भेट देणार आहोत.
पुरा उलुवातु (उलुवातु मंदिर)
बालीच्या दक्षिणेला अंड्याच्या आकाराचा एक छोटा भूभाग जिंबारन नावाच्या जमिनीच्या चिंचोळ्या पट्टीने मुख्य बेटाला जोडलेला आहे. हे दोन्ही भूभाग मिळून बुखित व्दीपकल्प बनलेले आहे. बुखितच्या पूर्व टोकावर भारतीय महासागराच्या किनार्यावर पुरा उलुवातु उर्फ उलुवातु मंदिर आहे.
हे मंदिर बाली बेटाच्या किनार्यांवर असलेल्या मुख्य नऊ दिशादर्शक मंदिरांपैकी एक आहे. प्राचीन काळापासून अस्तित्वात असलेल्या या मंदिराचा एंपू कुतुरान नावाच्या जावातल्या एका ऋषीने अकराव्या शतकात जीर्णोद्धार केला. त्यानंतर १४८९ मध्ये पूर्व जावावरून आलेल्या डांग ह्यांग निरर्थ या नावाच्या ऋषीने तेथे पद्मासन देवळांची स्थापना केली. याच ऋषीने बालीतील देवळांत पद्मासन (निराकार "संघयांग विदी वसा" किंवा "अचिंत्य" या देवासाठी कलापूर्ण दगडी कोरीवकाम असलेले कमलासन) स्थापन करण्याची प्रथा पाडली. निरर्थ ऋषीला उलुवातुमध्ये मोक्षप्राप्ती झाली असे सांगितले जाते. बालीत जागोजागी असलेल्या पद्मासनांना धार्मिक महत्त्व तर आहेच. पण त्यांच्यावरील कलापूर्ण कोरीवकामांमुळे ती कलाकृती म्हणूनही प्रेक्षणीय आहेत...
... 
... 
पद्मासनांचे विविध प्रकार
उलुवातु मंदिराच्या आवारात शिरण्यापूर्वी मार्गदर्शक आपल्याला तेथे असलेल्या वानसेनेपासून सावध राहण्याचा इशारा देतो. आजूबाजूला घोटाळत राहून पर्यटकांच्या हातातल्या खाण्यापिण्याच्या वस्तू, कॅमेरे, पर्स, चष्मे, इत्यादी एखाद्या कसलेल्या पाकिटमाराच्या सफाईने काढून घेऊन झाडाच्या टोकावर पळून जाण्यात ही सेना पटाईत आहे...
वानरसेना
बालीतील देवळांच्या अंतर्भागात फक्त हिंदूंनाच आणि तेही केवळ पूजेअर्चेसाठीच प्रवेश मिळतो. बालीतील मंदिरांच्या आवारात प्रवेश करण्याअगोदर आपली वेशभूषा देवळाच्या पावित्र्याला साजेशी असणे आवश्यक असते. अपुरे कपडे परिधान केलेल्या पर्यटकांसाठी देवळाच्या व्दाराबाहेर निळ्या-किरमिजी, भगव्या किंवा पिवळ्या रंगाची लुंगीसारखी वस्त्रे (सरोंग) मोफत वापरायला मिळतात...
अंगभर कपडे असल्याने (आणि कार्तिकने अभिमानाने "हे हिंदू आहेत" असे सांगितल्यानेही असावे !) आम्हाला एक पिवळी फीत कमरपट्ट्यासारखी बांधली तरी पुरे असे सांगितले गेले.
देवळाच्या जवळपास गेल्यावर जमीन एकाएकी ७० मीटर खाली कोसळते आणि आपण एका उंच आणि लांबच लांब नागमोडी कड्याच्या टोकावर पोहोचलो आहोत हे ध्यानात येते...
मंदिराजवळचा कडा, सफेद वाळूचा किनारा आणि त्याच्या पायथ्याला धडका देणारा भारतीय दुग्ध-महासागर
हजारो वर्षांपासून समुद्र, वारा आणि पावसाच्या आघातांनी या चुनखडीच्या दगडांनी बनलेल्या किनार्याच्या होणार्या झिजेचा हा परिणाम आहे. मात्र यामुळे त्या कड्याच्या टोकावरचे हे मंदिर एक नेत्रदीपक स्थळ झाले आहे.
येथील चुनखडीच्या खडकांची झीज होऊन बनलेले पांढर्याशुभ्र वाळूचे सुंदर किनारे आणि खवळलेल्या भारतीय महासागरातील सर्फिंगसाठी योग्य अश्या लाटा हे सुद्धा पाश्चिमात्य पर्यटकांना खेचणारे महत्त्वाचे विशेष आहेत.
या मंदिराच्या मुख्य व्दाराच्या बाजूला संरक्षक म्हणून गणेशमूर्ती आहेत...
व्दारपाल गणेश
अजून एक गणेशमूर्ती आणि इतर कोरीवकाम
हिंदू असल्याचा (आणि कार्तिकच्या वशिल्याचा) फायदा आम्हाला बर्याच ठिकाणी देवळांत नेहमीपेक्षा जरा जास्त खुला प्रवेश मिळण्यासाठी झाला. मंदिरात अनेक कोरीवकामांचे नमुने आहेत. त्यापैकी काही खाली देत आहे...
असुर व्दारपाल
अंतःपुराचे व्दार
मंदिराच्या चौथर्याचा वाहक आणि रक्षक
खांबावरचे कोरीवकाम
दगडी खिडकीवरचे कोरीवकाम
मंदिराच्या दोन्ही बाजूंच्या कड्यांलगत बर्याच लांबीपर्यंत पायवाटा बनवलेल्या आहेत. उसळणार्या सागराचे दर्शन घेत पायवाटेवरून बरेच अंतर कापल्यानंतर मंदिर असलेल्या पूर्ण कड्यासकट मंदिराचे मनमोहक दर्शन होते...
कड्यालगत असलेली एक पायवाट
पायवाटेवरून दूरवरून दिसणारे उलुवातु मंदिर आणि त्याचा कडा
हजारो वर्षे निसर्गाचा आघात झेलत झिजत जाणारा हा भूभाग आता फारच अस्थिर आणि धोक्याचा होऊ लागला आहे. मंदिर असलेला कडा झिजून अगदी मंदिराच्या आवाराला टेकला आहे. पुढच्या काही वर्षांत / दशकांत तो तुटून मंदिराला धोका होऊ शकतो...
मंदिराच्या कुसापर्यंत झीजलेला कडा
समुद्रात गिळंकृत होत जाणारा किनारा
बालीतल्या मोठ्या मंदिरांपैकी एक नसले तरी कड्याच्या टोकावर बसलेले उलुवातु मंदिर उंच खडे कडे, कड्यांच्या लगत असलेल्या लांबच लांब पायवाटांवरून चालताना होणारे मंदिराचे आणि सागराचे मनमोहक दर्शन, आणि कड्यांवरून दिसणारा सूर्यास्त अशा अनेक कारणांनी एक कायम लक्षात राहणारे स्थळ बनले आहे.
===================================================================
केचक नृत्यनाट्य
उलुवातु मंदिराला संध्याकाळी भेट देण्याने अजून एक मोठा उद्देश सफल होतो. तो म्हणजे तेथे होणार्या केचक नृत्यनाट्याचा कार्यक्रम पाहणे.
मंदिराशेजारच्या एका खड्या कड्याच्या टोकावर, वर मोकळे आकाश, मागे अथांग हिंदी महासागर आणि मावळतीला जाणारा सूर्य अशी जगावेगळी "नेपथ्य आणि प्रकाशयोजना" असलेल्या खुल्या रंगमंचावर हा कार्यक्रम सादर केला जातो!...
केचकचा खुला रंगमंच
पूर्वी रोगाच्या साथीपासून गावाचे रक्षण करण्यासाठी केल्या जाणार्या "संघयांग" या धार्मिक कर्मकांडाची केचक ही सुधारलेली आवृत्ती आहे. त्यात रामायणाचे काही भाग (वायांग वोंग) सादर केले जातात. ५०,००० ओळींच्या मूळ बाली रामायणाच्या संहितेचा काही भाग पर्यटकांसाठी सादर केल्या जाणार्या या कार्यक्रमात दाखवला जातो.
या कार्यक्रमाचे खास वैशिष्ट्य असे की यात वाद्ये वापरली जात नाहीत. त्याऐवजी एक ७० सहाय्यक कलाकारांचा ताफा तोंडाने "चकं-चकं, चकं-चकं" असा आवाज काढून पार्श्वसंगीत देतो. या जगावेगळ्या वाद्यसमुहाला तोंडाने विशिष्ट आवाज काढून मार्गदर्शन करणारा एक दिग्दर्शक असतो. या पार्श्वसंगीतामुळेच या नृत्याला केचक हे नाव पडले आहे. ही मंडळी नाट्यातल्या वेगवेगळ्या प्रसंगांत जंगलातली झाडे, लक्षमणरेखा, गरूडाचे साथी, रावणाचे साथी, वानरसेना, इत्यादी बनून नाटकातल्या सहकलाकारांचे आणि "प्रॉपर्टी"चेही काम करतात...
खचाखच भरलेल्या प्रेक्षागृहाचा एक भाग
व्दीपप्रज्वलनाने कार्यक्रमाची सुरुवात
सहकलाकार + वाद्यवृंद : एकावर एक फुकट ;)
वनवासात सीता आणि राम
सुवर्णमृगाच्या रूपातला मारीच दैत्य आणि राम
सीता लक्ष्मणाला रामाच्या मदतीला जायला सांगते
सीताहरण
जटायूवध
राम-लक्ष्मणाचा शोक
'आनोमान'चे (हनुमानाचे) आगमन
अशोकवनातील सीता
हनुमानाच्या मर्कटलीला
अशोकवनातील सीता-हनुमान भेट
या नाटकात सूर्याची फार फार महत्त्वाची भूमिका असते... योग्य "टायमिंग" साधून तो "एक्झिट घेतो" आणि नाट्याचा पुढचा प्रवेश सुकर होतो...
सूर्याने योग्य टायमिंग साधून घेतलेला एक्झिट
सुर्याजीरावांच्या एक्झिटने झालेल्या अंधारातील पुढच्या प्रवेशात रावणाचे सेवक "आनोमान" च्या शेपटीला आग लावतात आणि मग तो लंकादहनाचे तांडव सुरू करतो...
मग राम रावणवध करून सीतेची सुटका करतो. सरतेशेवटी, प्रेक्षकांनी केलेला टाळ्यांच्या कडकडाटाचा सत्कार स्वीकारायला सर्व कलाकार रंगमंचावर येतात. आठवण म्हणून प्रेक्षकांना कलाकारांबरोबर फोटो काढता येतात...
तिकिटाचे ४०,००० रुपिया (२०० भारतीय रुपये) व्याजासकट दामदुपटीने वसूल होतात असे म्हटले तर ती अतिशयोक्ती होणार नाही. हा जगावेगळा रामायणाचा प्रयोग पाहिल्याशिवाय बालीची भेट पुरी होऊच शकत नाही.
केचक नृत्याची चित्रफीत (जालावरून साभार)...
("Kecak Dance" हे शब्द वापरून यु ट्युब विचारणा केल्यास अजून बरेच व्हिडिओ सापडतील.)
मुख्य कलाकारांचे आकर्षक पोशाख; "चकं-चकं-चकं-चकं" आवाजाचं पार्श्वसंगीत; महासागर व कड्याचे नैसर्गिक नेपथ्य; आणि प्रत्यक्ष सूर्यमहाराजांचा नेपथ्ययोजनेत सहभाग यांनी समृद्ध केलेला हा अनोखा नृत्यनाट्यप्रयोग ! रामायणाची कथा माहीत नसलेल्या पर्यटकांनाही तो पाहून एक अनोख्या अनुभूतीचा अनुभव नक्कीच येत असणार.
परतताना जंबारनच्या समुद्रकिनार्यावरील एका हॉटेलमध्ये जेवणाला थांबलो. त्याच्या स्वागतकक्षात ही गणेशमूर्ती होती...
समुद्राच्या लाटांपासून दोन हाताच्या अंतरावर असलेल्या वाळूवर टाकलेल्या टेबलांवर बालीच्या समुद्रान्नाची चव घेताना आजचा दिवस सार्थकी लागल्याचे समाधान मनात होते.
(क्रमशः )
तिथले द्वारपालांचे चेहरे हे मला सिंहमुखाशी साधर्म्य असलेले वाटत आहेत. कदाचित इथल्या किर्तीमुखांवरून प्रेरणा घेऊन अशी शिल्पे घडवली जात असावीत.
आमच्या खिद्रापूरच्या कोपेश्वर मंदिरावरची ही कोरीव दगडी खिडकी बघा. किती सारखी. :)
दक्षिणपूर्व आशियाच्या सगळ्याच देशांवर भारतिय संस्कृतीचा खोलवर प्रभाव आहे. हे केवळ विचारांचे आदानप्रदान किंवा व्यापारी संबद्ध नव्हते तर त्याकाळात तेथे जाऊन धर्म, राजसत्तेचा आणि कलेचा वारसा घेऊन जाणार्या दर्यावर्दी भारतियांचा हजारो वर्षांचा इतिहास आहे. त्या देशांतील सर्व धर्मांना छेद देत जाणारा लोकजीवनात असलेला रामायण-महाभारताचा आणि संस्कृत भाषेचा प्रभाव असेच नाही तर तिथल्या जनतेत असलेले १०-१५% भारतीय Y-क्रोमोसोम्स हा पण त्या वस्तुस्थितीचा ठाम शास्त्रिय पुरावा आहे.
या सर्व गोष्टी त्या देशांत, अगदी सद्या मुस्लीम असलेल्या देशांमध्येसुद्धा, ऐतिहासिक वारसा म्हणून सहजपणे आणि अभिमानाने सांगितल्या जातात आणि संग्रहालयांत जपून ठेवल्या जातात. स्वार्थी राजकारण, स्वतःबद्दलची कमीपणाची भावना (लो सेल्फ एस्टीम) किंवा तद्दन अज्ञान यामुळे भारतात दुर्दैवाने अगदी याविरुद्ध अवस्था आहे !
पंधराव्या शतकापासून भारतात व तेथे झालेल्या मुस्लीम आक्रमणांमुळे आणि नंतर पाश्चिमात्य वसाहतवादामुळे ही प्रक्रिया खंडली. वसाहतवाद संपल्यावर बदललेल्या समिकरणांमुळे ती प्रक्रिया पुनःस्थापीत करण्यात कोणालाच रस राहिला नव्हता. तरीसुद्धा तेथिल जनमानसावरचा तो ठसा अजूनही कायम आहे हे विशेष.
कालच्या अर्ध्या दिवसाच्या फेरीच्या अनुभवानेच बाली पर्यटकांचे इतके आवडते ठिकाण का आहे हा प्रश्नच निकालात निघाला होता. त्यामुळे सकाळी न्याहारी वगैरे करून तयार होऊन उत्सुकतेने लॉबीत पोहोचलो. कार्तिक त्याचा हसरा चेहरा आणि खेळकर स्वभाव घेऊन आमची वाट पाहत होता. तेव्हा वेळ न घालवता त्वरीत बाहेर पडलो.
शहराच्या बाहेर पडलो आणि बाली तिचे सौंदर्य मोकळेपणे उलगडू लागली. बालीला निसर्गाने हिरवेगार डोंगर, दाट झाडी, लहान-मोठी तळी यांच्या रूपाने सौंदर्य भरभरून दिले आहे. लोकांनीही त्या सौंदर्याची नीट जपणूक करून वर त्यात आपल्या कलाकृतींची आणि सणसमारंभांची भर घालून ते अधिक खुलवले आहे. गावां-शहरांतील स्वच्छता आणि नीटनेटकेपणा लक्षणीय आहे.
वातावरण ढगाळ आणि कुंद होते. पण शहर मागे पडल्या पडल्या हिरवी झाडी व भाताची शेते असलेला परिसर सुरू झाला आणि मनावरचे तरी मळभ दूर झाले...
बराच भाग अगदी जंगलातून चाललो आहे असे वाटावे असाच होता. मात्र रस्त्यावरची दुचाकी वाहने लोकवस्तीपासून फार दूर नसल्याची जाणीव करून देत होती...
मधून मधून छोटी पण स्वच्छ आणि नीटनेटकी गावे लागत होती...
तर मधूनच डोंगरउतारावरची हिरवाई आणि भातशेतीची खाचरे मन मोहून टाकत होती...
तास-दीड तासाच्या नयनरम्य प्रवासानंतर आम्ही आमच्या आजच्या पहिल्या आणि एका खास आकर्षणाजवळ, बेसाकी गावाजवळ, पोहोचलो...
बेसाकी गावातली पारंपरिक घरे
घराच्या आवारातली देवांची आणि पूर्वजांची देवळे
पुरा बेसाकीला बालीतल्या सर्व मंदिरांची माता समजले जाते. असे हे महामंदिर पाहण्याअगोदर बालीतील मंदिरांबद्दल थोडीशी सर्वसाधारण माहिती घेणे मनोरंजक आणि उपयोगी होईल. शिवाय ही माहिती आपल्याला पुढच्या सफरीतील इतर मंदिरे व स्थळे नीट समजून घ्यायलाही उपयोगी पडेल.
बालीतील मंदिरे
बालीतील मंदिरांची रचना इतर ठिकाणच्या बंदिस्त खोल्यांच्या मंदिरांसारखी नसते, तर उघड्या आकाशाखालील कूस असलेले एक आवार अशी असते. बेसाकीसारखे मोठे मंदिर असल्यास त्यातल्या अनेक उपमंदिरांची आवारे एकमेकाला अनेक कोरीव व्दारांनी जोडलेली असतात.
प्रकार:
बालीत मंदिरांच्या स्थानावरून त्यांचे खालीलप्रमाणे प्रकार पडतात :
१. पुरा काह्यांगन जगद् (Pura kahyangan jagad): ही मंदिरे पर्वतांच्या अथवा ज्वालामुखींच्या उतारावर बांधलेली आहेत. पर्वत आणि विषेशत: ज्वालामुखी यांना बाली हिंदू धर्मात असलेल्या उच्च स्थानामुळे या मंदिरांचा दर्जा सर्वात वरचा आहे. पुरा बेसाखी या प्रकारातले सर्वोच्च मंदिर आहे.
२. पुरा सेगारा (Pura segara): ही मंदिरे सागरकिनार्यावर बांधलेली आहेत.
३. पुरा देसा (Pura desa): ही मंदिरे बेटाच्या (देशाच्या) अंतर्भागात सपाटीवर बांधलेली आहेत.
४. पुरा तिर्ता (Pura tirta): ही मंदिरे पाण्याचा स्रोत (झरा, नदी, तळे, इ) असलेल्या (म्हणजे तीर्थाच्या) ठिकाणी बांधलेली आहेत. या मंदिरांच्या पुजार्यांना शेतीकरिता पाणीवाटप करण्यासाठी बनवलेल्या "सुबक" नावाच्या प्राचीन जलनियोजन व्यवस्थेत महत्त्वाचे स्थान असते. ही प्राचीन धार्मिक-सामाजिक-आर्थिक व्यवस्था अजूनही बालीच्या काही विभागांत व्यवस्थितपणे चालू आहे !
रचना:
मंदिरांची रचना सर्वसाधारणपणे पवित्र त्रिमंडल सूत्रावर बेतलेली असते:
१. निस्तामंडल उर्फ जबा पिसान: या सर्वात बाहेरच्या आणि कमी उंचीच्या आवारात सुशोभित बाग असते. तेथे मंदिरांतील समारंभांची तयारी करण्यासाठी लागणारी जागा राखीव ठेवलेली असते. धार्मिक समारंभातील नृत्य इत्यादी कार्यक्रमांसाठीही ही जागा वापरली जाते.
२. मद्यमंडल उर्फ जबा तेंगा: हे मध्यभागातील आवार भाविकांनी करण्याच्या धार्मिक विधींसाठी वापरले जाते. तेथे मंदिराचा मुदपाकखाना, भाविकांना पुजार्यांशी संवाद करण्यासाठीची जागा आणि मंदिराची वाद्ये ठेवण्याची जागा असते.
३. उतममंडल उर्फ जेरो: हे आवार मंदिराचा सर्वात पवित्र आणि सर्वात उंचीवरचा भाग असतो. तेथे अचिंत्यचे पद्मासन, पॅगोडासारखे एकावर एक अनेक छपरे असलेले "पेलिंग्गी मेरू" नावाचे मनोरे आणि वेदपठणासाठी राखीव जागा असते.
व्दारे:
बाली स्थापत्यकलेत मंदिरांची मुख्यतः दोन प्रकारची व्दारे असतात :
१. चंडी बेंतार (Candi bentar) म्हणजे दुभंगलेले व्दार. बालीत हे सतत दिसत राहते कारण मंदिराच्या सर्वात बाहेरच्या निस्तमंडलात प्रवेश करण्याच्या मार्गावर ते असते.
२. कोरी अगुंग किंवा पदुरक्ष (kori agung or Paduraksa) प्रकारचे व्दार मध्यमंडल आणि उत्तममंडलाला जोडते. वर छप्पर असलेल्या या व्दारावरचे कोरीवकाम आणि रंगरंगोटी अतिशय कलापूर्ण असते.

कोरी अगुंग
दारांच्या रचनेची आणि जागांची ही पद्धत मंदिरांप्रमाणेच राजेरजवाड्यांच्या (आणि आता श्रीमंतांच्या) महालांसाठीही वापरली जाते.
अगुंग पर्वतावरची मंदिरमाता पुरा बेसाकी
पुरा बेसाकी हे बालीतील सर्वात पवित्र आणि आकाराने सर्वात मोठे मंदिर आहे. याला बालीतील सर्व मंदिरांची माता समजले जाते. या मंदिराचे बेसाकी हे नाव ज्याचा समुद्रमंथनात दोरीसारखा उपयोग केला होता त्या सर्पराज बासुकी (वासुकी) याच्या नावावरून पडले आहे.
हे मंदिर सर्वप्रथम केव्हा स्थापित केले गेले याबाबत नक्की माहिती नाही. पण "पुरा पेनातरान अगुंग" या त्याच्या मुख्य भागातील दगडी चौथर्याच्या मेगॅलिथिक पिरॅमिडसारख्या रचनेवरून ते मंदिर कमीतकमी २००० वर्षांपूर्वीपासून अस्तित्वात असावे असे मत आहे. बालीतील धर्मग्रंथांप्रमाणे बालीत हिंदू धर्म सर्वप्रथम मार्कंडेय आणि अगस्ती ऋषींनी आणला. त्यापेकी मार्कंडेय ऋषींनी बेसाकीच्या प्राचीन मंदिराला हिंदू मंदिर बनवले असे मानले जाते. पुरा बेसाकीमध्ये हिंदू उपासना १२८४ साली जावातील हिंदू साम्राज्याच्या बालीवरील यशस्वी आक्रमणांच्या सुरुवातीने सुरू झाली असेही मानले जाते. पंधराव्या शतकामध्ये बालीमधिल गेलगेल या हिंदू राजघराण्याने त्याला राजमंदिराचा दर्जा दिला.
हे मंदिर बालीतील सर्वात उंच (३०३१ मीटर) आणि सर्वात पवित्र अश्या अगुंग पर्वताच्या (गुनुंग अगुंगच्या) दक्षिणपश्चिम उतारावर १००० मीटर उंचीवर वसलेले आहे. बाली पुराणे व लोककथांप्रमाणे अगुंग पर्वत ही विश्वाचा मध्य समजल्या जाणार्या मेरू पर्वताची प्रतिकृती आहे. काहींच्या मते "मेरू पर्वताचे पामीरचे पठार -> भारत -> पूर्व जावा -> पश्चिम जावा असे विस्थापन होताना अगुंग पर्वत हा त्याचा बालीमध्ये पडलेला एक तुकडा आहे". तर इतर काहींच्या मते "तो हिंदूंनी बालीत येताना बरोबर आणलेला मेरूचा तुकडा आहे". पर्वत आपल्या जागेवरून हलून / हलवून हजारो किलोमीटर दूर जाणे / नेणे हे वास्तवात शक्य नाही. त्यामुळे, ही कथा बहुतेक "दूरवर स्थलांतरीत होणार्या लोकांनी स्वतःची संस्कृती / मायभूमीची मूठभर माती बरोबर आणणे आणि ती नवीन जागेत रुजविणे / जागेच्या मातीत मिसळणे" या कृतीचे प्रतिकात्मक रूप असावे. ते काहीही असले तरी अगुंग पर्वताचे बालीच्या धर्मात आणि समाजजीवनात अनन्यसाधारण महत्त्व आहे. (समुद्रमंथन : मानवाचे प्राचीन जलप्रवास या लेखात मी "मेरू हे प्राचीन काळातील समुद्रप्रवासाच्या आणि म्हणूनच सांस्कृतिक-व्यापारी-आर्थिक-राजकीय-दृष्ट्या महत्त्वाच्या केंद्राचे नाव असावे आणि त्या केंद्राची जागा काळाबरोबर बदलणार्या वस्तुस्थितीबरोबर बदलत गेली असावी." या कल्पनेच्या बाजूचे काही पुरावे मांडले होते. या केंद्राची नंतर पुराणांत आणि लोककथांत विश्वाचे केंद्र अशी "सुधारून वाढवलेली" आवृत्ती झाली असावी.)
अगुंग पर्वत त्याच्या उंचीमुळे पश्चिमेकडील समुद्रावरून आलेले ढग पूर्णपणे रोखून धरतो. त्यामुळे पुरा बेसाकी असलेला त्याचा दक्षिणपश्चिम उतार वर्षभर ढगांनी वेढलेला, थंड आणि हिरवागार असतो, तर त्याचा उत्तरेकडील उतार बाष्पाअभावी कोरडा आणि रखरखीत असतो. अगुंग पर्वतावर बालीतील सर्वात मोठा जिवंत ज्वालामुखी आहे. त्याच्या १९६३-६४ मध्ये झालेल्या उद्रेकात १७०० लोक मृत्युमुखी पडले होते. त्यावेळी लाव्हाचा ओघ मंदिरापासून केवळ काही मीटर दुरून गेला आणि (बालीकरांच्या मते दैवी चमत्कारामुळे) मंदिराला अजिबात धोका पोहोचला नाही.
बालीचे धार्मिक वर्ष २१० दिवसांचे असते. अश्या प्रत्येक वर्षात या मंदिरात कमीत कमी सत्तर मोठे सणसमारंभ साजरे केले जातात !
पर्वताच्या पायथ्याजवळ गाडीतून पायउतार होऊन चालू लागताच आजूबाजूचा सुंदर असलेला आणि "सुंदर राखलेला" परिसर आपले लक्ष वेधून घेतो...
पुरा बेसाकीकडे जाणार्या रस्त्यावर टिपलेले एक दृश्य
हे मंदिर म्हणजे "पुरा पेनातरान अगुंग" या मुख्य मंदिरासकट एकमेकाला लागून असलेल्या (बालीतील वेगवेगळ्या हिंदू संप्रदायांचे प्रतिनिधित्व करणार्या) २३ उपमंदिरांचे संकुल आहे. ह्या मंदिराची रचना "मंडल" प्रकारची आहे. या रचनेत पर्वताच्या उतारावर पिरॅमिडसारखे खालून वरपर्यंत सहा स्तर आहेत. मंदिराला दुभागणार्या एका मध्य आसाच्या दोन्ही बाजूला असलेल्या आवारांत उपमंदिरे आहेत. आवारांच्या बाजूंनीही वरखाली जाण्यासाठी पायर्या आहेत. मुख्य आसाभोवती दोन्ही बाजूंना समान असणारी रचना नैसर्गिक आणि आध्यात्मिक समतोलाचे निदर्शक समजली जाते. पूजनीय समजला जाणार्या अगुंग पर्वताच्या उतारावर असल्याने या रचनेला आपोआपच पावित्र्याची झालर आली आहे. मंदिराच्या सर्वोच्च स्तरावरून फक्त आजूबाजूचा परिसरच नाही तर बालीभोवतीचा समुद्रही दृष्टिक्षेपात येतो.
हे सर्व मंदिरसंकुल पाहायचा आध्यात्मिक आणि पर्यटन आनंद घेण्यासाठी शेकडो पायर्यांचा चढ-उतार करायची तयारी ठेवायला लागते हा आधिभौतिक मुद्दाही आतापर्यंत तुमच्या ध्यानात आला असेलच !
चला तर असे हे एकमेवाव्दितीय मंदिर पाहायला...
पुरा बेसाकीचा आराखडा
पुरा बेसाकीचे प्रथमदर्शन
...
...
पुरा बेसाकीचे काही संरक्षक
.सर्वात खालच्या पहिल्याच स्तरावर जाण्यासाठी असलेल्या असंख्य पाहिर्या सुरुवातीलाच छातीवर दडपण आणतात ! त्या आपल्याला दुभंगलेल्या मेरुपर्वताच्या रूपातील चंडी बेंतार प्रकारच्या सर्वात बाहेरच्या मुख्यद्वारापर्यंत घेऊन जातात...
पुरा बेसाकी : पहिल्या स्तरावरच्या मुख्य चंडी बेंतार प्रकारच्या व्दाराकडे नेणार्या पायर्या
मदिराच्या दोन्ही बाजूने सहाही स्तरांवर जाण्यासाठी पायर्या आहेत. त्यांच्यावरून वर जाताना उपमंदिरांची बाहेरच्या बाजूची चंडी बेंतार व्दारे लागतात. प्रत्येक दोन स्तरांमधिल उंचीच्या फरकात पिरॅमिडच्या पायर्यांसारखी पण त्यापेक्षा जास्त गुंतागुंतीची कलापूर्ण रचना आहे. या रचनेत अनेक ठिकाणी झाडेझुडुपे आणि फुलझाडे लावून सुंदर बागा केल्या आहेत...
पुरा बेसाखीतील दोन स्तरांमधली पायर्या-पायर्यांची आकर्षक रचना
पुरा बेसाखीतील दोन स्तरांमधल्या रचनेतील बागा आणि बाहेरून दिसणारी उंच कोरीव पद्मासने आणि व्दारे


पुरा बेसाकीच्या उतममंडलात प्रवेश करण्यासाठी असलेले कोरी अगुंग (जालावरून साभार)
सर्वात उंच असलेल्या उतममंडलातील पद्मासनांवर देवाला वाहिलेला प्रसाद व फुले ठेवतात, तर मोकळ्या आवाराचा उपयोग भाविकांना बसून प्रार्थना करण्यासाठी व प्रवचन ऐकण्यासाठी होतो. येथे मेरू पर्वताचे रूपक असलेली पॅगोडासारख्या वर वर लहान होत जाणार्या छपरांच्या अनेक मजली इमारती असतात. त्यांची छपरे गवताच्या खास प्रकारच्या रचनेने बनविलेली असतात...
पुरा बेसाकीचा अंतर्भाग : ०१

पुरा बेसाकीचा अंतर्भाग : ०२ : पॅगोडासारखे दिसणारे मनोरे (पेलिंग्गी मेरू)
पुरा बेसाकीचा अंतर्भाग : ०४
पुरा बेसाकीचा अंतर्भाग : ०५
पुरा बेसाकीचा अंतर्भाग : ०६
पुरा बेसाकीचा अंतर्भाग : ०७ : पुजारी मंडळींच्या नावाची यादी... मोबाईल फोन नंबर सकट
पुरा बेसाकीचा अंतर्भाग : ०८ : मंदिरातली खास बालीनीज वाद्ये
पुरा बेसाकीचा अंतर्भाग : ०९ : पार्श्वभूमीवर दिसणारा पर्वतराज अगुंग... क्षणभर ढगाआडून डोकावून दर्शन देताना
पुरा बेसाकीचा अंतर्भाग : १० : अचिंत्यची पद्मासने
पुरा बेसाकीचा अंतर्भाग : १२
या देवळाच्या अंतर्भागातली दृश्ये जेवढी अनवट आहेत, तेवढेच एक किलोमीटर उंचीवरून दिसणारे परिसराचे दृश्य नयनरम्य आहे. हे महादेवूळ, ज्वालामुखीसह असलेला अगुंग पर्वत, हिरवाईने नटलेला परिसर; सगळे मनाला भारून टाकते. हजारेक वर्षांपूर्वी भारतातून येथे स्थलांतरीत होणार्या आणि या भूमीत मुळे रोवून प्रतिकूल परिस्थितीत अजूनही आपला धर्म आणि संस्कृती केवळ जतन करणार्याच नाही तर दर दिवशी अभिमानाने साजरा करणार्या बालीच्या जनतेबद्दल मनात काय भावना येतात हे सांगणे कठीण आहे !
केवळ वेळेचे बंधन पाळायला हवे म्हणून जड पावलांनी गाडीच्या दिशेने निघणे भाग पडले.
(क्रमशः )
इतकी प्रशस्त देवळे आहेत म्हटल्यावर येथील लग्नकार्ये देवळांमध्येच होत असावीत का? असा प्रश्न पडला. साहेब, आता तुम्ही एक पुस्तक छापायचे मनावर घ्याच! आम्ही ते नक्की विकत घेऊ.
मला बालीतले लग्न बघण्याची संधी मिळाली नाही, पण तो विधी मोठा रंगीबेरंगी आणि चित्ताकर्षक असतो असे वाचून-ऐकून आहे.
त्यामुळे सद्या बालीनीज लग्नसमारंभाची काही चित्रे पाहूनच समाधान करून घेणे भाग आहे :( (सर्व चित्रे जालावरून साभार)
मुख्य समारंभ....

रुखवत...
...
करवल्या...
वरात...
.
पाश्चिमात्यही बालीत हा विधी करवून घ्यायला येतात...
.
बाली लग्न करण्यासाठीचे आणि दुसर्यांदा लग्नाच्या आणाभाका पुन्हा घेण्यासाठीचे (रिन्युअल ऑफ वाव्ज) एक जानेमाने आंररराष्ट्रिय ठिकाण बनले आहे. हे समारंभ देऊळ, बौद्धमंदिर, रिसॉर्ट, खास व्हिला, चर्च, इ हवे तिथे करता येतात. हे काम करणार्या बर्याच कंत्राटी कंपन्या तेथे आहेत.
देवळात कोणताही विधी करायला हिंदू असणे जरूरीचे असते. पुरा बेसाखी अथवा इतर मोठी मंदिरे बडेजावासह केलेल्या समारंभाना वापरता येत नाहीत.
गाडी रस्त्याला लागली आणि बालीच्या नयनरम्य निसर्गातून आमचा प्रवास सुरू झाला. आजच्या सहलीत अनेक छोटे मोठे रोचक थांबे होते. शिवाय प्रवासातल्या अनेक निनावी जागाही इतक्या सुंदर होत्या की डोळ्यांना आणि कॅमेर्याला मेजवानीच होती. इथे कार्तिकचा नेहमीचा अनुभव कामाला आला असणार, कारण आम्ही काही म्हणण्याच्या आधी "पाहिजे तेथे फोटो काढायला खुशाल गाडी थांबवायला सांगा" असे त्यानेच सांगून टाकले !
किंतामणी
अगुंग पर्वताच्या उत्तरपूर्वेला असलेल्या बातूर पर्वतावर बालीतील दुसरा महत्त्वाचा जिवंत ज्वालामुखी आहे. हल्लीच्या काळात म्हणजे १८०४ आणि १९६८ सालीही या ज्वालामुखीतून लाव्हाचा उद्रेक झाला होता. त्याच्या २३ ते २८ हजार वर्षांपूर्वी झालेल्या उद्रेकाने बनलेल्या प्रचंड विवरात १० X १३ किलोमीटर आकाराचे बातूर तळे आणि त्या तळ्याकाठी वसलेली प्राचीन पार्श्वभूमी असलेली अनेक गावे आहेत. हा किंतामणी नावाचा भाग त्याचा "स्फोटक" इतिहास, अप्रतिम निसर्गसौंदर्य आणि प्राचीन संस्कृती यामुळे बालीतील एक महत्त्वाचे पर्यटक आकर्षण बनले आहे. येथील पर्वतराजीत अनेक सुंदर पर्वतारोहण (ट्रेक) करण्याचे मार्ग आहेत. त्यातले काही तर अगदी बातूर पर्वतशिखरावरील ज्वालामुखीच्या मुखापर्यंत घेऊन जातात. इ स २०१२ मध्ये UNESCO ने या प्रभागाला Global Geopark Network मध्ये स्थान दिले आहे.
अनेक आकर्षणे व अपुरा वेळा यामुळे या भागाचा मध्ये मध्ये फोटोथांबे घेत चारचाकीनेच धावता दौरा केला...
या रस्त्यावरून पुढच्या थांब्याकडे जाताना अनेक पारंपरिक बालीनीज घरे दिसत होती...
बातूर पर्वत आणि बातूर तळे
बातूर पर्वताच्या उतारावर आणि बातूर तळ्याच्या काठी वसलेल्या गावांचे विहंगम दृश्य
पुरा तिर्ता एंपुल
तंपाक सिरिंग गावाजवळचे हे मंदिर इ स ९६२ मध्ये वर्मदेव राजघराण्यातील राजा इंद्रजयसिंह याने स्थापन केले एका मोठ्या झर्याच्या ठिकाणी बांधले. एका दंतकथेप्रमाणे मयदानव नावाच्या असुराने देवांच्या सेनेवर विषप्रयोग केला आणि इंद्राने त्या सैनिकांना या झर्याची निर्मिती करून त्याच्या पवित्र पाण्याने परत जिवंत केले. त्यामुळे लोक या पवित्र तीर्थावर डुबकी घेऊन पुण्य कमावायला आणि रोगमुक्तीसाठी येतात. मंदिराच्या आणि त्याच्या आजूबाजूच्या परिसरात असलेल्या शिलालेखांप्रमाणे या जागेचे नाव वेगवेगळ्या काळांत "तिर्ता री ऐर हांपुल", "तिर्ता हांपुल" व "तिर्ता एंपुल" असे बदलत गेले आहे. त्यातल्या पहिल्या नावाचा अर्थ "जमिनीतून बाहेर येणारे पाणी" असा आहे.
मंदिराच्या आवारात शिरल्या शिरल्या खुद्द देवांचा राजा इंद्र आपले स्वागत करतो......
इथले दुभंगव्दार इंद्राच्या नावाला शोभेल असे भव्य आणि कोरीवकामाने
भरलेले आहे. त्याच्या मागे दिसणारा मंदिराचा हिरवागार परिसर मन प्रसन्न
करतो...
आत शिरल्या शिरल्या एका बाजूने बालीनीज ढबीत हिंदी गाणी ऐकू आली. त्या बाजूला पाहिले तर एक बाली महिला गात होती. आश्चर्याने थांबून ऐकू लागलो तर तिने धडाधड आठ-दहा गाण्यांचे मुखडे म्हणून दाखवले. हे सगळे केवळ भारतीय लोक (आम्ही) दिसल्याने गमतीने चालले होते. आमचा फोटो काढा असे म्हणून खरंच फोटो काढताना मात्र बाईसाहेबांनी चेहरा झाकून घेतला...
हिंदी चित्रपट आणि गाणी बालीत खूप लोकप्रिय आहेत याचे प्रत्यय पुढेही येत राहिले.
देवळाच्या आवारात शिव, विष्णू, ब्रम्हा, बातूर पर्वत आणि इंद्राची देवळे आहेत. भाविकांना आराम करण्यासाठी एक मोठा सुंदर सजावट केलेला मंडप आहे...
मंडप

पुरा तिर्ता एंपुलचे कोरी अगुंग

पुरा तिर्ता एंपुलमधिल अजून दोन कलापूर्ण व्दारे
इथले सर्वात महत्त्वाचे आकर्षण आहे इथले कोई माश्यांनी भरलेले कुंड आणि त्यात झर्याचे पवित्र पाणी सोडणार्या (आपल्याकडे गोमुखे असतात तशा) बारा झरण्या. भाविक प्रथम देवळात जाऊन पूजा करतात आणि मग कुंडात उतरून स्नान आणि प्रार्थना करतात. इथले पाणी (गंगाजलासारखे) बाटल्यांत भरून घरी नेण्याचीही प्रथा आहे...
पवित्र कुंड
देवळाचा संपूर्ण परिसर वृक्षराजीने व वाहत्या पाण्याच्या झर्यांनी समृद्ध आणि मन प्रसन्न करणारा आहे...
देवळाचा परिसर अनेक सुंदर दगडी, लाकडी कलाकृतींनी आणि नयनरम्य रंगरंगोटीने भरलेला आहे. त्यातले काही नमुने आपण पाहूया...
काय बघू आणि काय नको असे होते. कॅमेर्याला ह्या मंदिरात जराशीही फुरसत मिळत नाही. इतक्या सुंदर कलाकृती असलेल्या मंदिरात संरक्षक नाहीत असे कसे होईल ? त्यातले हे दोन नमुने..

येथील परिसराला निसर्गाने भरभरून सौंदर्य बहाल केले आहे. त्यामुळे या मंदिरातली मानवी कलाकुसर बघणे हा जितका आनंददायी अनुभव आहे तितकाच आनंद आपली नजर मंदिराच्या आजूबाजूच्या परिसरातील निसर्गावर गेल्यावर होतो. या देवळाशेजारी १९५४ मध्ये इंडोनेशियाच्या पहिल्या राष्ट्राध्यक्षाने (सुकार्नो) आपली सुटी व्यतीत करण्यासाठी एक प्रशस्त बंगला बांधलेला आहे...
बंगल्याचे दोन टेकड्यांवरील दोन भाग जोडण्यासाठी एक खाजगी पूल आहे !...
आजकाल हा बंगला देशाच्या खास पाहुण्यांच्या पर्यटनासाठी वापरला जातो.
हे होते बालीतील अजून एक ठिकाण, जिथून पाय निघणे कठीण होत होते. नाईलाजाने आमचा पुढचा प्रवास सुरू करावा लागला. निसर्गरम्य परिसरातून आमचा रस्ता कधी छोट्या गावातून जात होता...
तर कधी केवळ काही शाकारलेली घरे आणि भाताची खाचरे असलेल्या ग्रामीण भागातून जात होता...
(क्रमशः )
गोआ गजा
उबुद नावाच्या गावाजवळ एक ९ व्या शतकात खोदलेली गोआ गजा (गजगुहा; गोआ = गुहा, गजा = गज) नावाची गुहा आहे. ही जागा पूर्वी ऋषिमुनी तपश्चर्येसाठी वापरत असत. या गुहेच्या मुखाभोवतीच्या खडकांत असुर आणि भयानक प्राण्यांचे मुखवटे कोरलेले आहेत. त्यातले मुख्य शिल्प हत्तीसारखे दिसते अश्या कल्पनेवरून या गुहेचे नाव पडले आहे. देशवर्णन नावाच्या इ स १३६५ मध्ये लिहिलेल्या एका जावानीज कवितेत या जागेचे वर्णन केलेले आहे. १९५० साली केलेल्या उत्खननात येथे अनेक धार्मिक स्नानकुंडे सापडली आहेत. १९९५ मध्ये या जागेला UNESCO World Heritage च्या यादीत समाविष्ट केले गेले आहे.
चला तर, मारूया चक्कर या सांस्कृतिक महत्त्व असलेल्या अजून एका निसर्गरम्य ठिकाणाची...
भाविकांना आराम करण्यासाठी मंडप
एक स्नानाचे कुंड
गजगुहेचे मुख
गुहेतली गणेशमूर्ती
गुहेतली तीन शिवलिंगे
अशी गणेशमूर्ती आणि शिवलिंगे हे बालीतील प्रार्थनास्थळांमध्ये अपवादात्मक आहे. कदाचित ही गुहा मंदिर नसून ध्यानधारणेचे ठिकाण असल्यामुळे तसे असावे.

उत्खनन केलेली पण वापरात नसलेली काही कुंडे आणि पलीकडे दिसणारा मंडप
एका मंदिराचे शिखर
गुहेपलीकडे असलेल्या एका उतारावर आणि त्यावरुन उतरून उतरलेल्या दरीत सुंदर बाग तयार केली आहे. त्यामुळे हे ठिकाण केवळ धार्मिक स्थळ न राहता फिरायला जाण्यासाठीचे पर्यटन स्थळही बनले आहे...
बागेतला एक वृक्षराज त्याच्या वैशिष्ट्यपूर्ण मुळांच्या जाळ्यासकट...
अजून एक सरोंग नेसलेला वृक्षराज...
एका काळी या जागेवर बौद्धमंदिर बांधण्याचे प्रयत्न केले गेले, पण दर वेळेस ते मंदिर बांधत असतानाच कोसळल्यामुळे ते प्रयत्न सोडून देण्यात आले. त्या प्रयत्नांची खूण असलेले भग्नावशेष आजही तेथे दिसतात...
भग्न बौद्धमंदिराचे अवशेष
बाहेर पडताना बालीनीज कलाकुसरीची झलक दाखविणारे हे दुकान दिसले...
बालीच्या अंतर्भागातली, विशेषतः: उबुद आणि आजूबाजूच्या डोंगराळ भागातली, सफर म्हणजे डोळ्यांना केवळ मेजवानीच... कोंकणाची हमखास आठवण करून देणारी...
वाटेतल्या एका चौकातले शिल्प
बालीतील निसर्ग व समाजजीवन एकमेकाला इतके पूरक आहेत आणि एकमेकात अकृत्रिमरीत्या इतके बेमालूम मिसळून गेलेले आहेत की एकदा शहरी भागांच्या बाहेर पडलो की त्यांना वेगळे करणे शक्य होत नाही... लोक जंगलात-निसर्गात राहतात की जंगलाने-निसर्गाने लोकवस्त्यांत शिरकाव केला आहे हा प्रश्न पडावा अशीच काहीशी अवस्था आहे.
याचाच प्रत्यय देणारे हे रेस्तराँ...

रेस्तराँचे प्रवेशव्दार
रेस्तराँचा परिसर
स्वागतकक्ष

आणि ही जेवणाच्या खोलीची जिवंत नैसर्गिक पार्श्वभूमी !...
अश्या ठिकाणी जेवायचे विसरायला होईल, तर जेवणाचे फोटो काढायला विसरलो (खरोखरच विसरलो !) तर त्यात आश्चर्य वाटू नये !
जेवणानंतरचा सगळा वेळ बालीच्या मानवनिर्मित कलाकुसरींसाठी प्रसिद्ध असलेल्या काही गावांना भेट देण्यासाठी राखून ठेवलेला होता. यातली तीन जरा जास्त प्रसिद्ध आहेत. उबुद चित्रकारांचे; मास लाकडावरचे कोरीवकाम करणार्या कलाकारांचे; तर चेलुक धातूकाम करणार्या (विशेषतः: चांदी आणि सोन्याचे दागिने घडविणार्या) कलाकारांचे गाव आहे. या प्रत्येक गावात त्या त्या प्रकारच्या कलाकारांची दुकाने आणि प्रदर्शने आहेतच, पण त्यांच्या कार्यशाळांत जाऊन त्यांचे चाललेले कामही जवळून पाहता येते.
मास येथील एका प्रदर्शनातल्या काही कलाकृती...
मुखवटे
बाहुल्या
गरूडावर बसलेला विष्णू आणि ड्रॅगन
गणेश आणि सरस्वती
ही त्याची थोडीशी झलक...
प्रदर्शनातून बाहेर पडलो तरी पावसाचा जोर कमी होण्याचे लक्षण दिसत नव्हते. त्यामुळे नाईलाजाने चेलूकला जाण्याचा विचार सोडून हॉटेलवर परतलो.
(क्रमश: )
आजची सकाळ जराशी आळसावलेली होती. कारण आज बालीतला गालुंगन नावाचा एक मुख्य सण होता आणि त्यानिमित्त कार्तिकला देवळात जायचे होते. त्यासाठी सकाळी अकरा-साडेअकरा वाजेपर्यंत सुट्टी मागितली होती. बालीतल्या सर्वात मोठ्या सणासाठी मागितलेल्या दोनतीन तासांच्या मोकळिकेला नाही म्हणणे कठीण होते. त्यानेही उरलेल्या वेळाचे नीट नियोजन करून ठरवलेली सगळी आकर्षणे पुरी करण्याचे आश्वासन दिले होते.
तरीसुद्धा सहलीवर असताना सकाळी उशीरापर्यंत नुसते झोपून राहणे जरा कठीणच होते. जराशी उशीराच न्याहारी केली तरी दोन एक तास जमेला होते. त्यामुळे रिसॉर्टच्या आवारात आणि आजूबाजूला फेरी मारायला बाहेर पडलो.
तेव्हा केलेल्या कॅमेऱ्याच्या क्लिकक्लिकाटीपैकी काही...
रिसॉर्ट : ०१
रिसॉर्ट : ०२
रिसॉर्ट : ०३
रिसॉर्ट : ०४
रिसॉर्ट : ०५
रिसॉर्ट : ०६
रिसॉर्ट : ०७ : रक्षक

रिसॉर्ट : ०८ : जवळच्या रस्त्यावर आम्हाला धनुष्यबाण विकत घेण्याची गळ घालणारा एक फेरीवाला
फिरायला निघण्या अगोदर आपण जरा गालुंगन या बालीच्या सर्वात मोठ्या सणाची माहिती घेऊया.
गालुंगन
बालीची पारंपरिक दिनदर्शिका २१० दिवसाची आहे. गालुंगन हा बालीचा सर्वात महत्त्वाचा सण अर्थातच दर २१० दिवसांनी येतो. या सणात धर्माचा अधर्माविरुद्ध झालेला विजय साजरा केला जातो. तसेच या सणात पूर्वजांचे आत्मे पृथ्वीवर भेटीस येतात असा समज आहे. या सणात मुख्य देव अचिंत्य याची आणि पूर्वजांच्या आत्म्यांची यथासांग पूजा करून त्यांना प्रसाद अर्पण केला जातो. संपूर्ण बालीमध्ये हा सण आपल्याकडच्या दिवाळीसारखा मोठ्या थाटामाटाने साजरा जातो. मुख्य दिवसाच्या तीन दिवस अगोदरपासून ते अकरा दिवस नंतरपर्यंत काहीना काही समारंभ साजरे केले जातात. त्यांचे वेळापत्रक असे असते:
३ दिवस अगोदर : पेन्येकेबान : केळ्याच्या खास पदार्थांचा नैवेद्य
२ दिवस अगोदर : पेन्याजान : जाजा नावाच्या केकसारख्या दिसणार्या तळलेल्या भाताच्या पदार्थाचा नैवेद्य
आणि धार्मिक पठण
१ दिवस अगोदर : पेनांपहान : डुक्कर आणि कासवांचा बळी देऊन त्यांच्या मांसाची मेजवानी
मुख्य दिवस : गालुंगन : वाजतगाजत फुले व प्रसाद घेऊन देवळात जाऊन पूजा आणि प्रार्थना
१ दिवस नंतर : मानिस गालुंगन : नातेवाइकांच्या भेटीगाठी
१० दिवस नंतर : कुनिंगन : प्रार्थना आणि पुजा. या दिवशी पितरे स्वर्गात परततात.
११ दिवस नंतर : मानिस कुनिंगन : मौजमजा आणि करमणूकीचे कार्यक्रम
लोक गटागटाने आणि काही वेळेस मोठ्या समारंभाने देवळांत जाताना दिसतात. काहीजण त्यांचे खास ठेवीतले पारंपरिक पोशाख घालून फिरत असतात. एकंदरीत सर्व बालीभर आनंदाचे वातावरण असते.
या सणाचा एक भाग म्हणून आपल्याकडे दसर्याला उभारल्या जातात तश्या पण त्यापेक्षा बर्याच वेगळ्या आणि खूपच जास्त कलाकुसर असलेल्या "पेंजोर" नावाच्या बांबूच्या गुढ्या घरोघरी चढाओढीने उभारल्या जातात. पेंजोरमध्ये देव व पितरांसाठी प्रसाद व फुले ठेवण्यासाठी खास व्यवस्था असते. श्री जय कुसुनु या बाली धर्मग्रंथाप्रमाणे पेंजोर हे पवित्र अगुंग पर्वताचे प्रतीक आहे. जंगलाने झाकलेले पर्वत पाणी साठवतात आणि ते नद्यांच्या रूपाने वर्षभर मानवाला देतात. म्हणून पेंजोर हे पर्वतांप्रती व्यक्त केलेल्या कृतज्ञतेचे प्रतीकही समजले जाते.
असा हा काहीसा आपल्याकडच्या गुढीपाडवा आणि पितृपक्षाचा संगम असलेला बालीचा सण आम्हाला अनपेक्षितपणे बंपर बोनस म्हणून पाहायला मिळाला !
===================================================================
चला, इतक्यात साडेअकरा वाजले देखील, कार्तिक पण आला आणि आपली फिरायला जायची वेळ झाली...
बाहेर पडल्या पडल्या या पहिल्या पेंजोरने दर्शन दिले... आणि असे दर्शन दिले म्हणून सांगू... गाडी थांबवून फोटो काढावाच लागला...
पेंजोर : गुढी हा शब्द खूप तोकडा आहे हे वाटायला लावणारी बालीची गुढी
सगळी बाली गालुंगन साजरी करत होती. सगळीकडे सोहळ्याचे वातावरण होते. दारोदारी पेंजोर... वेगवेगळ्या कलाकुसरीने सजलेल्या... सगळ्या एकमेकांशी स्पर्धा करत होत्या... कोणतीही एक पेंजोर दुसरीसारखी नव्हती...
......
......
......
शहराबाहेर पडल्यावर दिसणार्या निखळ निसर्गसौंदर्याला अजून जास्त झळाळी देणे शक्य आहे का ?...
खरेच शक्य आहे का ?...
हा प्रश्न मनात येण्याअगोदरच मधून मधून समोर आलेल्या गावांच्या दर्शनाने त्याचे उत्तर आपोआप मिळाले...
घरांशेजारी असणारी देवळेही आज रंगीबेरंगी कपड्यांनी आणि सरोंगनी सजवलेली दिसत होती...
काही घरांसमोर कुटुंबातले सदस्य कोंडाळे करून बहुतेक, "आपली पेंजोर शेजार्यांच्या पेंजोरपेक्षा वरचढ दिसायला अजून काय करायला पाहिजे बरे?" असे खलबत करत होते...
डोक्यावर प्रसाद व पूजेच्या साहित्याच्या टोपल्या घेऊन महिलावर्ग लगबगीने देवळांकडे निघाला होता...
पुरुषही मजेत गप्पा मारत देवळाच्या दिशेने रमतगमत निघाले होते. वाटेतले फुलाफळांचे दुकानदार त्यांना अडवून व्यवसायाची पर्वणी साधून घेत होते...
स्थानिक सांस्कृतिक मंडळांचे सदस्य त्यांचे पारंपरिक गणवेश पेहरून, छत्रचामरांसह, वाद्ये वाजवत मिरवणुकीने देवळाकडे निघाले होते...
साहजिकपणे या सगळ्या सोहळ्यात मुलांचा उत्साह ओसंडून चाललेला होता...
एक आजोबा कडेवर घेतलेल्या नातवाला व्हरांड्यात उभे राहून कौतूकाने हा सगळा सोहळा दाखवत होते...
बालीमध्ये देवांना आणि पितरांना बांबूच्या आणि केळीच्या पानांच्या बनवलेल्या पसरट परड्यांमध्ये ठेऊन प्रसाद आणि फुले वाहतात...

अनपेक्षितपणे पुढे आलेल्या या सर्वात मोठ्या सणाने बालीची आठवण सुंदर कोरीवकामासारखी मनावर कायमची कोरून ठेवली आहे.
अश्या सोहळ्याची हवा पर्यटकांना लागणार नाही तर मग अजून काय होणार? वाटेत एका ठिकाणी थांबून आम्हीही स्थानिक टोप्या खरेदी केल्या आणि त्या घालून अस्सल बालीकर बनून गालुंगनच्या सोहळ्यात सामील झालो...
श्री इस्पीकचा एक्का बालीकर ;)
(क्रमश: )
पुरा उलुन दानू ब्रतान
हे बालीतील प्रमुख शैव मंदिर समुद्रसपाटीपासून १२०० मीटर उंचीवर असलेल्या ब्रतान सरोवराच्या काठावर वसलेले आहे. तेथील अकरा मजली पॅगोडासारखी इमारत (पेलिंग्गी) शिवपार्वतीच्या नावे बांधलेली आहे. या मंदिरात एक बौद्धमूर्तीही आहे. बालीच्या संस्कृतीतील जलदेवता दानूचेही मंदिर तेथे आहे आणि यावरून या मंदिराचे नाव पडले आहे. हे धार्मिक दृष्ट्या महत्त्वाचे स्थान तर आहेच, पण तसेच ते बालीच्या प्राचीन सुबक जलव्यवस्थेचे एक महत्त्वाचे केंद्रही आहे. १२०० मीटर उंचीवर असल्याने येथे वर्षभर थंड वातावरण असते आणि उष्ण कटिबंधात असल्याने अचानक धुवांधार पाऊस पडून ते केव्हाही अधिकच थंडगार होऊ शकते.
नेहमीच्या परंपरेप्रमाणे येथे असलेले दुभंगलेले मेरुव्दार आपले स्वागत करते...
चला तर मंदिराच्या आवारात फेरफटका मारू या...
बाहेरच्या आवारातली देवळे
.
भाविकांच्या आरामासाठी मंडप
मंदिराच्या अंतर्भागातील देवळे
आवारात थोडा वेळ फिरून झाले नाही तोच पाऊस सुरू झाला...
पुरा उलुन दानू ब्रतानचे कोरी अगुंग
आजूबाजूच्या पर्वतांवर आणि ब्रतान तलावावर तरंगणार्या ढगांच्यामुळे इथले वातावरण नेहमीच गुढगंभीर भासते. हा परिसर इतका सुंदर आहे की इथे येणारा पर्यटक, मग तो आस्तिक असो वा नास्तिक, नक्कीच भारून जातो. पूर्वीच्या काळी या मंदिराची पॅगोडासारखी दिसणारी (पेलिंग्गी) इमारत मूळ भूभागाला जोडून असलेल्या जमिनीवर होती. पण जमिनीची झीज होऊन तो भूभाग किनारपट्टीपासून वेगळा झाल्याने आता ती इमारत सरोवरातील एका छोट्या बेटावर आहे...
सरोवरातल्या बेटावरची अकरा मजल्यांची पेलिंग्गी
सरोवराकाठच्या देवळाच्या परिसरात बालीच्या परंपरेला अनुसरून सुंदर बाग केलेली आहे...
जरी पाय निघायला तयार नव्हते तरी पावसामुळे तेथून निघणे भाग पडले.
वाटेत डोंगराळ प्रदेशातल्या एका रेस्तराँमध्ये जेवण घेतले. बाली जितकी तिच्या चवदार जेवणासाठी लक्षात राहिली आहे त्यापेक्षा जास्त तेथील रेस्तराँच्या जेवणाच्या कक्षांच्या एकाहून एक वरचढ मनमोहक नैसर्गिक पार्श्वभूमींमुळे लक्षात राहिली आहे. वानगीदाखल दरीच्या टोकावर असलेल्या इथल्या रेस्तराँच्या भोजनकक्षातून दिसणारा हा निसर्गाचा (अजून एक) नजारा पहा...
पुरा तमान आयुन
पोटपूजा आटोपून आम्ही बालीच्या मध्यभागातले पुरा तमान आयुन हे बालीच्या राजघराण्याचे मंदिर पाहायला निघालो. हे मंदिर इ स १६३४ मध्ये मेंगवी राजघराण्यातील राजाने बांधले. राजमंदिर असल्याने अर्थातच हे मंदिर आखीवरेखीव पण तरीही निसर्गाला कोठेही उगाचच कृत्रिमतेचा स्पर्श न होवू देत बांधलेले आहे. हे मंदिर नदीत असलेल्या एका बेटावर आहे. या सर्व मंदिरसंकुलाची बांधणी भवसागरात तरंगणार्या पवित्र मेरू पर्वताचे प्रतीक म्हणून केलेली आहे. बेटावर मंदिराच्या चारी बाजूला पाण्याने भरलेला खंदक आहे. पिरॅमिडसारखे एका वर एक बागांचे चौथरे आहेत आणि त्यातल्या सर्वात वरच्या चौथर्यावर मंदिराचा मुख्य भाग आहे. त्यामुळे याचे "पुरा तमान आयुन" म्हणजेच "पाण्यात असलेल्या बागेतले मंदिर" हे नाव सार्थ होते.
आम्ही गेलो तेव्हा सतत पडणार्या पावसामुळे मंदिराकडे जाणार्या रस्त्याचा एक भाग खचला होता. नशिबाने अर्धा रस्ता चांगल्या अवस्थेत असल्याने बाली पोलिसांच्या देखरेखीखाली मंदिराकडे जाणारी पायी वाहतूक चालू होती. पाऊस बर्यापैकी हजेरी लावत असला तरी बालीकारांची गालुंगन निमित्ताने मंदिराकडे जाणारी गर्दी काही कमी नव्हती. आम्हीही त्या गर्दीत मिसळून गेलो.
नदीवरचा पूल पार करून आम्ही मंदिर असलेल्या बेटावर पोहोचलो...
मंदिराच्या भोवतालच्या खंदकावरचा छोट्या पुलाच्या टोकालाच देवळाचे सर्वात बाहेरचे मेरू पर्वताचे रूपक असलेले चंडी बेंतार प्रकारचे व्दार लागते...
चंडी बेंतार द्वारातून आत गेल्याबरोबर आपण मंदिराच्या भव्य प्रांगणात प्रवेश करतो...
चला मारूया फेरी या देवळाच्या आवारात...
मंदिराचे बाहेरचे आवार
कोरी अगुंग (मंदिराच्या अंतर्भागाचे प्रवेशव्दार)
मंदिराच्या अंतर्भागाची फेरी : ०१
मंदिराच्या अंतर्भागाची फेरी : ०२
मंदिराच्या अंतर्भागाची फेरी : ०३

मंदिराच्या अंतर्भागाची फेरी : ०४
मंदिराच्या अंतर्भागाची फेरी : ०५
मंदिराच्या बाजूच्या गावातले एक कारंजे
सगळीकडे उत्सवाचे वातावरण होते. देवळाबाहेर गालुंगन निमित्त अगदी भारतात असावी अशी यात्रा भरली होती...
पुरा उलुन दानू ब्रतान जवळची गालुंगन यात्रा
बालीच्या खवळलेल्या समुद्रकिनार्याजवळ 'ताना लोत' नावाचा एक खडक आहे. त्यावर 'पुरा ताना लोत' हे बालीतील अतीपवित्र मानले गेलेल्यांपैकी एक मंदिर आहे.
या मंदिरच्या स्थापनेमागे एक मनोरंजक कथा आहे. सोळाव्या शतकात बारथा (Baratha, Bharatha, भरत) नावाचा एक रक्षकाचे काम करणारा माणूस या किनापट्टीवर फिरायला आला असताना या बेटाच्या सौंदर्याच्या प्रेमात पडला आणि तेथेच राहू लागला. तो जवळपासच्या कोळी लोकांच्या नजरेस पडला आणि ते त्याला अन्न, फळे, इ देऊ लागले. ही कथा ऐकून तेथे आलेल्या निरर्थ नावाच्या ऋषींनाही ती जागा खूप आवडली आणि त्यांनी त्या बेटावर एक रात्र वस्ती केली. नंतर त्यांनी कोळ्यांना तेथे समुद्रदेवतेचे मंदिर बांधायला सांगितले. दिवसेंदिवस वाढत जाणार्या महत्त्वाबरोबरच या मंदिरासंबद्धीत दंतकथांमध्येही अर्थातच भर पडत गेली आहे. त्यातल्या काही म्हणजे या देवळाभोवती विषारी समुद्रसर्पांचा सतत पहारा असतो आणि निरर्थ ऋषींच्या वस्त्रापासून तयार झालेला एक महाकाय सर्पराज या मंदिराचे रक्षण करतो.
बालीभोवतीच्या समुद्रात बेटावर अथवा समुद्रकिनार्यावर एकूण सात मंदिरे आहेत. या मंदिरांच्या जागा अश्या आहेत की कोणत्याही एका मंदिरातून त्याच्या दोन्ही बाजूंची मंदिरे डोळ्याने दिसू शकतात. अश्या रितीने बालीच्या संपूर्ण किनार्यावर लक्ष ठेवण्यास या सात मंदिरांच्या माळेचा प्राचीन काळापासून उपयोग होत आहे. म्हणजे या मंदिरांनी प्राचीन काळापासून बालीच्या केवळ धार्मिक जीवनातच नव्हे तर संरक्षण व्यवस्थेमध्येही मोलाची कामगिरी बजावली आहे.
खवळलेल्या समुद्राच्या लाटांच्या सतत होणार्या भडिमारामुळे ताना लोत बेटाच्या खडकाची सतत झीज होत असते. १९८० मध्ये जपानी सरकारने दिलेल्या १३ कोटी अमेरिकन डॉलरच्या मदतीतून या बेटाची आणि बालीतील इतर महत्त्वाच्या स्थळांची डागडुजी करण्यात आली. ताना लोत बेटाच्या आता दिसणार्या खडकाचा जवळ जवळ एक त्रितियांश भाग या प्रकल्पात जीर्णोद्धार केलेल्या कृत्रिम खडकाने बनलेला आहे !
त्याच्या धार्मिक पार्श्वभूमीमुळे, वैशिष्ट्यपूर्ण स्थानामुळे आणि सौंदर्यपूर्ण परिसरामुळे हे मंदिर बालीतील प्रमुख पर्यटक स्थळांपैकी एक झाले आहे. चला तर या फेरफटका मारायला या मनोहारी मंदिराचा...
मंदिराच्या वाटेवर हा आधुनिक बाली शिल्पकलेचा नमुना आपले स्वागत करतो...
मंदिराच्या वाटेवरचे एक आधुनिक कलाकुसरीचा नमुना असलेले प्रवेशव्दार
मंदिराच्या वाटेवरचे एक आधुनिक कलाकुसरीचा नमुना असलेले प्रवेशद्वार : जवळून
मंदिराचे मेरूद्वार
मंदिराचे समुद्रकिनार्यावरील पूजास्थान आणि पुजारी (ब्राच्मन)
समुद्रातले मुख्य मंदिर : ०१
समुद्रातले मुख्य मंदिर : ०२
समुद्रातले मुख्य मंदिर : ०३
सुरक्षेच्या कारणासाठी बेटावरच्या मूळ मंदिराला भेट देता येत नाही याबद्दल खूप वाईट वाटले. पण त्याचे दुरून झालेले दर्शनही काही कमी मोहक नव्हते.
या ठिकाणाला संध्याकाळी भेट दिल्यास तिथला नयनरम्य सूर्यास्तही पाहता येतो. तिन्ही बाजूंनी खवळलेला हिंदी महासागर, त्याच्या लाटांच्या सतत मार्याला तोंड देत निर्धाराने उभे असलेले बेट, अंधुक संधीप्रकाशात दिसणारे गूढगंभिर मंदिर आणि दूरवर समुद्रात डुबकी मारणारा सूर्य... केवळ अवर्णनीय देखावा...
पुरा तान लोत जवळचा सूर्यास्त
मंदिराच्या शेजारीच एक पंचतारांकित रिसॉर्ट आहे. तेथेही काँक्रिटच्या मनोर्यांचा अट्टहास न करता बालीच्या पार्श्वभूमीला साजेश्या इमारती बांधल्या आहेत...
मंदिराच्या बाजूच्या एका रेस्तराँच्या बाहेर हे वैशिष्ट्यपूर्ण कारंजे दिसले...
किनारपट्टीने पायवाटेवरून फिरून मंदिराला अनेक कोनांतून आणि मावळत्या सूर्याच्या अनेक छटांत पाहताना वेळ कसा जातो ते कळतच नाही. शेवटी तो सोन्याचा गोळा समुद्रात पूर्णपणे बुडून गेल्यावर झालेला काळोखच आपल्याला धक्के मारून तेथून बाहेर काढतो.
(क्रमश: )
बेटावरची अकरा मजल्यांची पेलिंग्गी पाहून माऊंट मेरु चे २०००
वर्षापुर्वीचे एक चित्र जे हुबेहुब पार्टिकल अॅक्सलरेटरचे ब्लु प्रिंट
सारखेच असल्याचे आठवले.
चवथ्या दिवसाची सकाळ जरा उत्सुकतेतच उजाडली. कारण आज बालीचे पारंपरिक बारोंग लोकनाट्य बघायला जायचे होते. दोन दिवसापूर्वी पारंपरिक केचक नृत्यनाट्याने चकीत केले होते. म्हणून उत्सुकता अधिकच वाढली होती.
न्याहरी घ्यायला गेलो तर तेथे टेबलावर उभा असलेला हा गरूडराज समोर आला...
बाहेर पडून प्रवास सुरू झाला. सर्वसाधारण रस्त्यावरून जातानाही बालीचे निसर्गाशी असलेले निरागस नाते सतत पुढे येत राहिले...
बारोंग लोकनाट्य
बारोंग नाटकाच्या रंगमंदिरावर पोहोचलो. त्याच्या आवारातून फिरताना बालीच्या कलाकुसरीचे काही नमुने दिसले...
आम्ही वेळेवर पोहोचलो होतो. अगदी रोजच्या वापरातल्या वस्तू वापरून आणि सर्वसाधारण घराच्या अंगणात उभारला आहे असे वाटणारा पण तरीही आकर्षक दिसणारा रंगमंच होता. हळूहळू प्रेक्षकगण जमा होऊ लागला होता...
थोड्याच वेळात वाद्यवृंदही आपल्या जागेवर स्थानापन्न झाला. गंमत म्हणजे त्यांचा बसण्याच्या जागेला एक खराखुरा वृक्ष ढुशी देत होता. निसर्गाशी समरसता असून, असून नक्की किती असू शकेल याचा आपला अंदाज बाली पदोपदी सुखकारक रितीने चुकीचा ठरवत राहते ! ...
बालीच्या पौराणिक कथांत बारोंग हा सत्प्रवृत्तीचे प्रतिनिधित्व करणारा काहीसा सिंहासारखा दिसणारा दैवी प्राणी आहे. त्याविरुद्ध दुष्ट प्रवृत्तींचे प्रतिनिधित्व करणारी रांगदा ही असुरांची राणी आहे. बारोंगमध्ये या दोन प्रवृत्तींचा चाललेला अनादी आणि अनंत झगडा नाटकाच्या रूपात प्रदर्शित केला जातो. कथेत रंग भरायला बारोंगच्या साथीला दोन माकडे असतात आणि रांगदाच्या बरोबर दोन राक्षसी दासी असतात. हे सर्व नाट्य राजा, राणी आणि राजपुत्र यांच्या जीवनात रांगदाने चालवलेली असुरी ढवळाढवळ आणि बारोंगची त्याना होणारी मदत या मुख्य सुत्रावर बेतलेले आहे. त्यामध्ये "राजावर मुलाचा बळी देण्याची वेळ येणे", "राजपुत्राच्या शिवभक्तीमुळे ऐन वेळेला शिवाने प्रकट होऊन त्याचे रक्षण करणे", इत्यादी भारतियांना सहजसाम्य वाटणारे प्रसंग आहेत. बालिनीज भाषेमध्ये होणारे हे लोकनाट्य प्रेक्षकांना नीट समजावे म्हणून इंग्लिशमध्ये लिहिलेली त्याच्या संहितेची प्रत दिलेली असते. शिवाय मधून मधून इंग्लिशमध्ये केल्या जाणार्या टिप्पणीने लोकनाट्य समजायला काही अडचण पडत नाही. आकर्षक रंगीबेरंगी वेष, सुंदर नेपथ्य आणि मधून मधून असलेल्या विनोदी विरंगुळ्यामुळे हे लोकनाट्य बघायला खूप मजा येते.
चला तर, बघूया या लोकनाट्यातील काही क्षणचित्रे...
बारोंग
या लोकनाट्याचे मला वाटलेले विशेष म्हणजे जरी त्याची कथा चांगल्या-वाईटाच्या झगड्याबद्दल असली तरी ती "चांगल्याचा विजय, वाईटाचा पराजय आणि मग सगळे आलबेल" अश्या नेहमीच्या बाळबोध कल्पनाविलासाने संपत नाही. रांगदाला त्याच्या वाईट वागण्याचा पश्चात्ताप होतो आणि त्याचा बारोंगच्या हाती वध होतो... पण रांगदाचा एक सेवक त्याची जागा घेतो आणि चांगल्या-वाईटाचा झगडा अनंत कालासाठी चालूच राहतो अश्या वास्तविक संदेशाबरोबर हे लोकनाट्य संपते. प्राचीन काळापासून चालत आलेल्या या लोकनाट्यातील ही प्रगल्भता चकित करून जाते !
बाली सफारी पार्क
बारोंग लोकनाट्याची मजा मनात घोळवत बालीच्या नयनरम्य परिसरातून आमचा प्रवास पुढच्या आकर्षणाकडे सुरू झाला. सफारी पार्क म्हणजे प्राणिसंग्रहालयापेक्षा जास्त काय असू शकते अश्या विचाराने रुपरेखेत हा कार्यक्रम आम्ही जरासा मागेच सरकवला होता. पण नंतर तो चुकवला नाही त्याबद्दल स्वत:चे आणि कार्तिकचे आभार मानले. शिवाय पार्कच्या आवारात असलेल्या बालीतल्या एका खास आकर्षणामुळे ती भेट फारच संस्मरणीय झाली ते वेगळे. ते खास आकर्षण पुढच्या भागात येईलच. बाली सफारी पार्कचे संपूर्ण नाव "बाली सफारी आणि मरीन पार्क" असे आहे... "मरीन" भाग केवळ नावापुरताच आहे, पण सफारी भाग मात्र जागतिक तोडीचा आहे.
येथे प्राणिसंग्रहालयाबरोबरच संपूर्ण कुटुंबासह मजेत वेळ घालविण्यासाठी अनेक मनोरंजक क्रीडाविभाग, जलक्रीडा विभाग, प्राण्यांबरोबर खेळ / सफारीसाठी विभाग, प्राणिनाट्यमंच, राहण्याची सोय असणार्या झोपड्या / बंगले आणि या सगळ्याची मजा घेत असताना लागणार्या भुकेची चमचमीत सोय पाहणारी अनेक रेस्तराँ आहेत.
इथल्या प्राणिसंग्रहालयाचा विशेष म्हणजे इथे प्राणी विशाल जंगलसदृश्य भागांत आरामात मोकळे राहतात आणि त्यांना बघायला येणार्या पर्यटकांना बंदिस्त बसमधून फिरून त्यांचे दर्शन करावे लागते. जगभरचे प्राणी येथे त्यांच्या मूळ स्थानाच्या खंडांची नावे दिलेल्या वेगवेगळ्या विभागात राहतात. मार्गदर्शकासह असलेली बससेवा आपल्याला सगळ्या प्राणिसंगहालयाचा फेरफटका मारून आणते. एक भाग प्राण्यांची खास प्रदर्शने आणि प्राण्यांवर बसून करण्याच्या सफारीसाठी राखून ठेवलेला आहे. रात्रीच्या, शैक्षणिक आणि प्राणिसंरक्षणासंबद्धी खास सफारीही असतात. एकंदरीत केवळ "प्राणिसंग्रहालयाची चक्कर" असे नसून "दिवसभर प्राणी-पक्षांच्या सहवासात मजेत दिवस घालवायचे आणि त्याबरोबरच काही माहितीची शिदोरी बरोबर घेऊन परतायचे ठिकाण" असे या पार्कचे स्वरूप आहे.
चला तर फेरफटका मारायला या सफारी पार्कमध्ये. सर्वात प्रथम आम्ही प्राणिनाट्यगृहाकडे मोर्चा वळवला...
प्राणी-पक्षी-नाट्यगृह
सर्पकन्या
ओरांगउटान आणि त्याची मैत्रीण
खास मैत्रिणीने सांगितल्यावर त्या ओरांगउटानने मिनीटाभरात अख्खा नारळ सोलून दिला तर नवल काय !
सुमात्राच्या हत्तींचे खेळ
पांढरा वाघ
अस्वल
सुमात्राचे वाघोबा
हिप्पो
विल्डsबीस्ट / नू
आरामात निगुतीने बसून पावसाचा आनंद लुटणारे सिंहकुटुंब
वेगवेगळ्या रंगांचे जिराफ
झेब्रा
तीनरंगी झेब्रा
आफ्रिकन खिल्लार
"पुरा सफारी" या नावाप्रमाणेच या पार्कच्या एका भागात हिंदू उपासना करण्यासाठी मंदिर आहे...
पुरा सफारीचे कोरी अगुंग
सफारी पार्कच्या संस्थळावरील चलत्चित्रफीत...
बाली पार्कमधल्या गणेश पार्क नावाच्या विभागात "बाली थिएटर" आहे. त्याच्या प्रवेशव्दाराजवळ कला आणि शास्त्र यांच्या देवतेची (हे त्यांचे वर्णन आहे) ८ मीटर उंचीची बैठी मूर्ती आहे...
गणेश पार्कच्या प्रवेशव्दाराजवळील गणेशमूर्ती
बाली थिएटरमध्ये असलेल्या भव्य मंचावर "बाली अगुंग" नावाचे महानाट्य सादर केले जाते. त्याची माहिती आपण पुढच्या भागात घेऊ...
(क्रमश: )
बाली सफारी पार्कची खरी मजा घ्यायची तर पार्कमधील हॉटेलमध्ये दोनतीन दिवस राहून रात्रीची सफारी आणि बाली थिएटरमधील कार्यक्रमासह सगळी आकर्षणे पाहायला हवीत. पण आमच्या रूपरेखेत ते बसण्यासारखे नव्हते. शिवाय हा पार्क आणि त्यातल्या बाली थिएटरचा तर आमच्या भारतीय सहल कंपनीला पत्ताच नव्हता ! ऐन वेळेला आमच्या प्रवासाच्या रूपरेखेत या गोष्टी सामावून घेण्याच्या आमच्या इच्छेला पुरी करण्याचे श्रेय आमच्या मार्गदर्शकाला, कार्तिकला, जाते.
महानाट्य बाली अगुंग
"बाली अगुंग" या नाट्यामध्ये बालीचा इतिहास व दंतकथा यावर बेतलेल्या नाटकसंहितेचे नृत्य, संगीत, बालीच्या कठपुतळी बाहुल्या, चित्ताकर्षक वेशभूषा आणि जागतिक दर्जाचे नेपथ्य व प्रकाशयोजना वापरून अवर्णनीय सादरीकरण केले जाते.
स्वागतकक्ष
१२०० प्रेक्षकांना बसण्याची आरामदायी सोय असलेल्या या रंगमंदिराचा स्वागतकक्ष आंतरराष्ट्रीय दर्जाचा असून त्याचा उपयोग छोटेमोठे स्वागतसमारंभ करण्यास तसेच नाटकांच्या अगोदर आणि मध्यांतरात प्रेक्षकांना धक्काबुक्की न करता आरामात पेयपान-अल्पोपाहाराचा आस्वाद घेता येईल इतका मोठा आहे. त्याला लागून असलेली बाग मनोहर आहे असे बालीत सांगणे म्हणजे व्दिरुक्तीच होईल...
......
स्वागतकक्ष : ०१ व ०२ (जालावरून साभार)
......
स्वागतकक्ष : ०३ व ०४ (जालावरून साभार)
स्वागतकक्षातला ड्रॅगन
रंगमंच
येथील रंगमंच ८० मीटर लांब, ४० मीटर रुंद आहे. याच्या उंचीबद्दल खात्रीलायक माहिती मिळाली नाही पण माझ्या अंदाजाप्रमाणे ती १५-२० मीटर किंवा जास्त असावी....

विशाल रंगमंच (जालावरून साभार)
रंगमंचावर वेगवेगळे आश्चर्यकारक देखावे निर्माण करण्यासाठी असलेल्या अनेक साधनांत ५०० किलोपर्यंतच्या वजनाच्या हालत्या-सरकत्या देखाव्यांतील वस्तू चपळाईने हालवण्यासाठी अनेक कायमस्वरूपाच्या यांत्रिक व्यवस्था, धुके-धूर तयार करणारी यंत्रे, वेगवेगळ्या ७५ दिव्यांची यंत्रणा, सायक्लोरामा, बॅकड्रॉप फ्रेम्स, उत्कृष्ट ध्वनीयंत्रणा, इ चा त्यात समावेश आहे. जमीन दुभंगून अचानक वर येणार्या व्यक्ती-वस्तूंच्यासाठी रंगमंचाच्या तळात तीन खास छुपे दरवाजे आहेत.
खास उल्लेख करण्यासारखी गोष्ट म्हणजे रंगमंचासमोर पूर्ण लांबीचा आणि ४-५ मीटर रुंदीचा पाण्याने भरलेला खंदक आहे. त्याचा उपयोग काही प्रवेशांत गावाच्या नदीतीरावरचे प्रसंग व खर्याखुर्या नौकांसह नौकाविहाराचे प्रसंग रंगविण्यास केला जातो.
कलाकार
येथे होणार्या बाली अगुंग नावाच्या महानाट्याचा प्रयोगात १५० मानवी कलाकार, बालीच्या पारंपरिक कळसुत्री बाहुल्यांचे कलाकार, हत्ती आणि इतर प्राणी काम करतात
कथा
लोकप्रिय राजा श्री जयपंगुस (११७९-११८१) आणि त्याची कांग चिंग वी ही चिनी वंशाची राणी यांची प्रेमकथा बालीचे महाकाव्य समजले जाते. ही मूळ कथावस्तू बालीच्या निसर्गाच्या, संस्कृतीच्या, सामान्य जनजीवनाच्या आणि नेत्रदीपक राजेशाही झगमगाटाच्या पार्श्वभूमीवर मोठ्या कलात्मक रितीने सादर केली जाते. अनेक भव्य, चित्ताकर्षक आणि स्वप्नवत प्रवेशांनी हे नाटक प्रेक्षकांना खिळवून ठेवते आणि अनेकदा आश्चर्याने आ वासायला लावते.
बाली प्राचीन काळापासून त्याच्या नैसर्गिक सौंदर्यामुळे प्रसिद्ध आहे. तसेच ते जलव्यापाराचे महत्वाचे केंद्रही होते.
बालीचा राजा श्री जयपंगुस बालीला भेट देणार्या एका चिनी व्यापार्याच्या
कांग चिंग वी नावाच्या मुलीच्या प्रेमात पडतो. नाटकातला चिनी जहाजाचा
बालीच्या बंदरात प्रवेश आणि राजेशाही लग्नसमारंभ आपल्याला त्या काळाचे खरे
दर्शन देऊन जातात. राजा राणीसाठी खास नगरी उभारतो आणि तेथे राजधानी हलवतो.
मात्र त्यांच्या सुखी प्रेमकथेला गालबोट लागते. अनेक वर्षे जाऊनही राज्याला
वारस मिळत नाही. निराश झालेला राजा मोठ्या जलपर्यटनास बाहेर पडतो. त्याचे
जहाज प्रचंड वादळात सापडते आणि तो विचित्र प्राण्यांनी भरलेल्या एका अनोळखी
जादुई बेटावर जाऊन पडतो. तेथे तो मन:शांतीसाठी तपस्या करू लागतो. जलदेवता
दानूच्या आगमनाने त्याची तपश्चर्या भंग होते. देवी दानूच्या प्रेमात पडून
राजा तिच्याशी लग्न करतो आणि तेथेच राहू लागतो. त्यांना एक मुलगा होतो.
अनेक वर्षे वाट पाहून राणी (कांग चिंग वी) राजाच्या शोधाला बाहेर पडते. तिला राजा आणि दानू त्यांच्या मुलासह सापडतात. राणी रागावून तिच्या सैनिकांना त्यांच्यावर हल्ला करायला सांगते... त्यांत अनेक विचित्र प्राणी आणि नैसर्गिक आपत्ती त्यांचे योगदान मिळून युद्ध अधिकच भिषण होते. राजाच्या पूर्वायुष्याचे सर्व सत्य पुढे आल्याने रागावून आपली दैवी ताकद वापरून देवी दानू राजा आणि राणीचे दगडी पुतळ्यांत रूपांतर करते. मात्र त्यानंतर तिचा राग शांत झाल्यावर बालीच्या लोकांची विनंती मान्य करून ती राजपुत्राला गादीवर बसवून राज्यकारभार सुरू करते.
अशी ही काहिशी ऐतिहासिक आणि काहिशी दंतकथा असलेली पण बालीच्या सामाजिक-धार्मिक-सांकृतिक जीवनाचा अविभाज्य भाग बनलेली कहाणी आहे. राजा-राणीचे आत्मे "बारोंग लादुंग" नावाच्या सिंहासारख्या दिसणार्या पवित्र दैवी प्राण्याच्या रूपात आजही बालीचे रक्षण करत असल्याची बालीच्या लोकांना खात्री आहे. राजा, राणी आणि देवी दानू हे बालीत आजही वरिष्ठ देवतांपैकी मानले जातात. बालीमध्ये दरवर्षी (२१० दिवसातून एकदा) बारोंग लादुंगची मिरवणूक काढली जाते. देवी दानू बातूर सरोवराची जलदेवता आणि सुपीकतेची व धनधान्याची देवता मानली जाते.
रंगमंदिरात फोटो काढायला मनाई आहे. परंतू या महानाट्याच्या जालावरून साभार जमा केलेल्यांपैकी काही फोटो येथे दिल्याशिवाय राहवत नाही. त्यांच्यावरून ह्या नाट्याची पूर्ण कल्पना येणार नाही. पण त्याचे शब्दात वर्णन करणे कसे शक्य नाही याची थोडीशी कल्पना जरूर येईल.
कलाकारांचे पोशाख

कलाकारांचे पोशाख
......
राजा, त्याच्या उजवीकडे राणी वी आणि डावीकडे देवी दानू.....................राजा आणि राणी

जलदेवता दानू
नाटकातील क्षणचित्रे

राजाचा दरबार

चिनी व्यापारी आणि त्याच्या मुलीचे आगमन

राजा त्याच्या प्रेयसीचे स्वागत करताना... दोन खर्या हत्तींच्या सलामीसह

विवाहानंतरचा राजदरबार

समुद्रप्रवासात आलेल्या वादळात विचित्र जलचरांशी सामना करणारा राजा

अनोळखी बेटावरील विचित्र प्राण्यांशी सामना करणारा राजा

देवी दानूचे आगमन : ०१

देवी दानूचे आगमन : ०२

देवी दानू, राजपुत्र, पांढर्या कपड्यातले राजाराणीचे आत्मे आणि जनता...
नवीन राज्यकारभाराची सुरुवात... पार्श्वभूमीवर पवित्र बातूर पर्वत
या महानाट्याचा सोहळा पाहणे हा एक अवर्णनीय अनुभव असतो. बालीला जाऊन तो न अनुभवणे कल्पनेपलीकडचे आहे.
इतर काही थोडेसे... इकडचे तिकडचे
बालीच्या शिल्पकलेचे अजून काही नमुने
......

दोन खास संरक्षक असुर
......
राम .......................................................कुंभकर्ण
बाली अजून काही गोष्टींकरिता जगप्रसिद्ध आहे. अपुर्या वेळेमुळे त्या सर्व बघणे शक्य नव्हते अथवा त्या बघण्यासाठीची वेळ जुळून आली नाही. पण त्यांच्या उल्लेखाशिवाय बालीचे वर्णन अपुरे राहील म्हणून त्यांचा थोडक्यात उल्लेख...
बारोंगची मिरवणूक

(जालावरून साभार)
दहनविधी
हा सोहळा अर्थातच सुखकारक नाही आणि त्याकरिता बालीला प्रवासाला कोणीही जात नाही. पण कर्मधर्मसंयोगाने जर कोण्या खास माणसाच्या संदर्भात हा सोहळा बघायला मिळाला तर तो एक जगावेगळा अनुभव नक्कीच असेल...

(जालावरून साभार)
बालीचे समुद्रकिनारे
बाली सुंदर आणि सर्फिंगसाठी जगप्रसिद्ध असलेले समुद्रकिनारे आणि समुद्रकिनार्यावरील रिसॉर्ट यासाठीही प्रसिद्ध आहे. अपुर्या वेळेमुळे माझ्या सहलीच्या प्राधान्यक्रमात ते बरेच खाली असल्यामुळे मी त्यांना काट दिली होती. पण वेळ आणि आवड असल्यास यांचा आनंद जरूर घ्यावा...
......
(चित्रे जालावरून साभार)
इनमिन चार दिवसांचा सहवास... पण, विमान उडाले आणि बाली सोडताना मनात सहजच वियोगाचे दु:ख साठले होते...
बाली हे इंडोनेशियाच्या १७०० पेक्षा जास्त बेटांपैकी तुलनेने एक लहान बेट. पण ते जागतीक स्तराच्या आकर्षणांच्या यादीमध्ये खूप वरच्या ठिकाणी आहे. खरी बाली बघायची असली तर, तिची सहल करायची नसते... पूर्णपणे झोकून देऊन, बालीनीज बनून, बाली अनुभवायची असते. मग बाली तुमच्या मनात कायमचे घर करून राहते... सतत आठवत राहते... परतण्यासाठी सतत खुणावत राहते !
(समाप्त)
बाली पर्यटन दृष्ट्या सुधारलेले आहे. तेथे स्वस्तापासून ते पंचतारांकित हॉटेल-रिसॉर्ट्स आणि वाहतूकव्यवस्था उपलबध आहे. त्यामुळे होणारा खर्च प्रत्येकाच्या इच्छेप्रमाणे बराच कमी-जास्त होऊ शकतो. स्थानिक आकर्षणांची संख्या आणि राहण्याचे दिवस इ. प्रमाणे खर्च वरखाली होतो हेवेसान. विमानप्रवासाचा खर्चही सहल करण्याच्या वेळेप्रमाणे बराच बदलू शकतो. शिवाय तुमच्या ठरवलेल्या वेळेस खास ऑफर्स चालू असल्यास खर्चात बरीच बचत होऊ शकते.
सुदैवाने, आपल्या इच्छेप्रमाणे (वेळ, दिवस, हॉटेल, इ) सहल केल्यास किती खर्च होईल ते प्रत्येकाने जालावरून शोधून काठणे सहज शक्य आहे. माझ्या माहितीची काही संस्थळे खाली देत आहे...
बाली टुरीझमच्या या संस्थळाला जरूर भेट द्या.
जालावर अजूनही बरीच संस्थळे सापडू शकतील. निर्णय पक्का करण्याअगोदर त्यांच्यवरही जरूर नजर टाका.
उलुवाटू , बाली
बाली , मुस्लिम बहुल असलेल्या इंडोनेशियातील एक हिंदू बहुसंख्यानक जनता असलेले मनोहरी बेट.. या मुळे सर्वसाधारण भारतीय मनाला या बद्दल कुतूहल असते ...असावे !
पण
मी जेव्हा जेव्हा बाली बेटाला भेट दिली तेव्हा जे भावले ते असते धार्मिक
असण्यापेक्षा काहीतरी स्थापत्य, कला , सामाजिक , जेवण याची सगळ्यांची मिसळ
होती... कुठेतरी कोकणा सारखे वातावरण एखाद्या चांदोबा मासिकातल्या कथेत फेर
फटका मारल्यासारखे ( वर्षभराचं हिरवे पणा ) वातावरण आणि सर्वात महत्वाचे
म्हणजे अजूनही टिकून असलेली आणि दिसणारी तेथील संस्कृती...ती सुद्धा आज
जिथे तिथे फ्लेक्स चे राज्य आणि हजार वर्षांच्या दगडी मंदिराला रंगबिरंगी
ऑइल पेंट लावलेले आपण सर्वत्र बघत असताना ...रोजच्या जीवनात तिथे कलाकुसर
अजून टिकून आहे, गाव गावात अगदी सण नसताना सुद्धा कुटुंबे ठेवणीतला पेहराव
करून , डोकयावर प्रसादाचं कोरीव टोपल्या घेऊन गावदेवाला जाताना दिसतात,
दुकाने आणि घराबाहेर तुळशीवृन्दवना सारखे चबुतरे तिथे ठेवलेली इलुस्य
प्रसादाच्या टोपल्या, कानात चाफ्याचे फुल रोवून फारच कलात्मक पद्धतीने
केलीली पूजा.... आणि यात निसर्गाची मोहक रूपे, टेकडयांवर / उतरंडीवर केलेली
भात शेती , पंचमहाभूतानबद्दल दाखवलेला आदर , खेड्यात पारंपरिक नृत्य
करण्यासाठी बांधलेले सार्वजनिक सभागृहे ... बाली हिंदू , बाली बुद्ध ( चिनी
वंश ) यांची एकत्रित देवळे ...असा खूप काही आहे
कालमानाप्रमाणे
अर्थात तिथे हि अतिक्रमण आणि काँकर्ते आणि काचेचे जंगल हे रक्षण आहेतच पण
अजून बरेच टिकून आहे .. आणि भारतीय नागरिकांना व्हिसा आधी काढावा लागत नाही
त्यामुळे जाणे सोप्पे झाले आहे ... शिव्या जेवण हे भारतीय जेवणसारखे
मसालेदार + विविध फळफळावळ याची रेलचेल
असो त्यातील काही शब्दचित्रे : ( काही मी काढलेली अंतर्जालावरची )
१) उलुवातु मंदिर येथील पारपारंपारिक नृत्य
सीताहरण
कथा या नृत्यातून दाखवली जाते ,, खास म्हणजे २ गोष्टी , एक म्हणजे यात
कोठेही वाद्य वापरले जात नाही फक्त तोंडी आवाज .. आणि दुसरे म्हणजे हे
एखाद्या बंदिस्त सभागृहात ना होता समुद्रकाठील उंचीवरच्या पाथरवरील उघड्या
अँफिथिएटर मध्ये सादर केले जाते
वर्तुळ
करून हनुमानाचे वानर एका धीम्या तालात चाक चाक चकाक असं काही स आवाज काढीत
हे नाट्य साजरे केले जाते , रावण सुद्धा नुसता खर्जातील आवाज काढतो .
संवाद असे नाहीत .. आणि हावभाव यातून त्याचा दरारा दाखवतो . विशेष म्हणजे
पात्रांचे कपडे हे दर्जेदार आणि स्थानिक कापड / नैसर्गिक वस्तू वापरून
केलेले दिसतात ... उगाच प्लास्टिक चा मुगुट असले बेगडी नाही ...तसेच या
सर्व पात्रांचे जे हावभाव लकबी आहेत ते त्या त्या व्यक्तिरेखेचा स्वभाव
दाखवून जातो .. हनुमानाचे प्रेक्षातुन उड्या घेत फिरणारे, टोप्या उडवणे आणि
सारखे अंग खाजवणे ...रावणाची धीमी पण हल्ला केल्यासारखी पावले टाकण्याची
पद्धत .. इत्यादी
सूर्यास्त
होण्यसुमारास हे सगळे आपल्याला एका वेगळ्याच वातवरणात घेऊन जाते .. शेवट
लंका दहन सादर करिताना मध्ये वर्तुळाकार नारळाच्या गाठायचे तुकडे पेटवून
फारच सुंदर रित्या सादर केले आहे ...
घटोत्कच
२) मंदिर स्थापत्य:
देव देव्हाऱ्यात नाही ,, हे इथे सत्य आहे , गाभाऱ्यात मूर्ती नसते,
पताका ( नैसर्गिक गोष्टींपासून बनवलेल्या ,, लावण्याची प्रथा सर्वत्र आहे
पुजारी हा लुंगी आणि डोक्यवरील रंगीत रुमाल घालतो पण शिवाय लॅब कोट सारखा कोट घालतो! गम्मत वाटते
प्रवेशद्वारे अशी दोन भाग केलेली असतात बहुतेकदा.. कारण काय कोण जाणे , बाकी धर्मांमध्ये आपण पहातो ती कमान असते !
देवळात जातांना लुंगी सारखे काहीतरी वस्त्र नसावेत लागते ( मूर्त्यांना पण नेसवलेले असते )
३) उबूद ... हे डोंगरमाथ्यावरील थोडेसे थंड हवेचे ठिकाण ( जणू जुने खंडाळा)
स्थानिक
स्थापत्य पुरेपूर वापरलेले हे हॉटेल ( सकाळी सकाळी हॉटेल च्या
मुदपाकखान्यात नारळाच्या झावळ्या पेटवून केलेल्या शगडी वरील न्याहारी ..
अगदी कोकणात घेऊन गेली )
ती पाहताच बाला......
गरम पाण्याचे झरे आणि तलाव
सकाळ चा समुद्र
डासांची उदबत्ती ठेवण्यासाठी
- न्याहारी साठी पाव वैगरे ठेवण्यासाठी झाकणाच्या टोपल्या
- पांडव बीच येथील डोंगराच्या कडेच्या बाजूला खोदून बसवलेल्या एक पांडवाची मूर्ती
रोजची पूजा
मी इन्डोनेशियात सुमारे १८ वर्षे नोकरी केली आणि त्यामुळे जो बराच फिरलो, त्यातल्या बालीच्या काही आठवणी. बाली बेट इतर इन्डोनेशियापेक्षा वेगळेच असल्याने आणि विदेशी प्रवान्शाकरता बर्याच सोयी, विचारपूर्वक तयार केलेल्या असल्यामुळे बहुतेक प्रतेक प्रवासी बालीला भेट देतोच.
उलुवाटूला देवळाच्या वाटेवर अनेक माकडे अतिशय धूर्तपणे, प्रवाशान्कडचे हाताला लागेल ते पळवतात आणि जर काही खायला मिळाले तर पळवलेल्या वस्तू परतही देतात.
एकदा
बाली बेटाच्या अन्तर्भागात, आमच्या (बालीच्या हिन्दू) चालकाने एका,
प्रवासी मार्गात नसलेल्या आणि म्हणून शुकशुकाट असलेल्या, परन्तु बालीच्या
हिन्दून्च्या दृष्टीने महत्वाच्या अशा एका मन्दिरात नेले कारण चालकाला तिथे
काही उपासना करायची होती. मी हिन्दू असल्याचे माहीत असल्याने त्याने मलाही
बरोबर घेतले. मी आपला काही वेळ डोळे मिटून माहीत असलेले दोन चार श्लोक
म्हणून काही मिनिटात "उपासना" आटपून मो़कळा झालो पण चालकाने त्याची
"उपासना" बराच काळ
(सन्स्कृत मधीलच पण
वेगळ्याच तर्हेचे हेल काढून म्ह्टल्याने, अनाकलनीय "मन्त्र" म्हणत) चालू
ठेवली होती. त्यानन्तरच्या त्याच्या बोलण्यातून मी (फारच लौकर
"आटपल्यामुळे") खरोखरच हिन्दू असल्याबद्दलची त्याची शन्का डोकावत होती पण
रामायण, महाभारत, ब्रम्ह, भगवद्गीता इ.इ. मला माहीत असल्याची मी बोलण्यातून
खात्री करून दिल्यामुळे बहुतेक ही शन्का फिटली असावी.
इतर माहिती: जावा बेटावर "दिएन्ग" पठार या भागात काही शतकान्पूर्वी बान्धलेली आणि आता भग्नावस्थेत असलेली पाचही पान्डवान्ची मन्दिरेही एकदा पाहिली होती.
एकूण इंडोनेशिया सुखी आहे कि नाही माहित नाही .. कारण गरिबी, लोकसंख्येचा ताण, भ्रष्टचार हे सर्व आहे ...
बालीतील लोक वाटली सुखी आणि परिपूर्ण .. पर्यटन हा मोठा वयवसाय आणि रोजच्या जीवनाशी संस्कृतीची नाळ यात रममाण दिसतात
इंडोनेशिया
हा मुस्लिम बहुसंख्यांक असला तरी त्यांनी जुनी हिंदू संस्कृती सोडली
नाहीये... राजधानी जकार्ता मध्ये मुख्य चौकात कृष्ण -अर्जुन सारथ्य असा
प्रचंड मोठा पुतळा आहे ...त्यांच्या चलनावर गणपती चे चित्र आहे ,, हे जर
भारतातील "उदारमतवाद्यांना" दाखवले तर त्यांना फेफरे येईल ... हे झाले
सरकारी पातळीवरचे त्यात बाली तर काय हिंदूच आहे ( पण वंशाने बघायला गेला तर
भारतीय वंशाशी तसा संबंध दिसत नाही )
तरी
पण तिथे इस्लामिक धर्मांधता पण वाढत आहे .. सुन्नी वहाबी प्रथा आणि
त्यांचा जोर वाढत आहे , इसिस साठी पैसा गोळा करणे वगैरे ... जकार्ता च्या
ख्रिस्ती/ चिनी वंशाचं गव्हर्नर ला इस्लाम चा अपमान केलं म्हणून काढणे
इत्यादी ...बाली तील दहशतवादी घटना ( तिथे हि झाकीर नाईक सारखा अबुल बाकर
बशीर आहे !)
बांडुंग शहरातील काही लोक
जेव्हा भेटले त्यातील काही धार्मिक मुसलमान वाटले पण त्यांचीही अदब आणि
हस्तांदोलन करताना हस्तांदोलन करीत असलेल्या हाताला आपला दुसरा हात लावून
मग हस्तांदोलन करणे हा सूक्ष्म फरक हे बहुतेक जुन्या संस्कृतीचे प्रतीक
असावे
असं म्हणतात कि इंडोनेशिया च्या
एका माजी राष्ट्राध्यक्षाला एका अरब देशातील अधिकाऱ्याने कि राजाने विचारले
होते कि "हे काय तुमचं कडे या काफिर गोष्टी कश्या" तर त्याने म्हणे उत्तर
दिले होते कि "आमच्या पूर्वजांनी धर्म बदलला परंतु संस्कृती बदलली नाही..."
असो
.. मिपाचे सभासद श्री सुधीर जोशी आणि इतर हि काही मंडळी तिथे खूप वर्षे
राहिलेली आहेत त्यामुळे त्यांचयकडे या पेक्षा जास्त चांगली माहिती असू शकेल
बाली तलाव आणि त्यांची देवी पुरा ओलोंग दानु मंदिर तलावावरील पाण्यावर घिरट्या घालत आहे ब्रो. मंदिर पुरा उलुन दानू - बालीमधील मुख्य जलमंदिर, गिट-गिट धबधबा आणि ब्रॅटन तलावाचे स्थान आणि परिमाण
बालीमधील तलाव हे चार पर्वतीय जलाशय आहेत, जे बेटावरील ताजे पाण्याचे सर्वात मोठे जलाशय आहेत. स्थानिक रहिवाशांची पाण्याबद्दल एक विशेष आणि अत्यंत आदरणीय वृत्ती आहे - शेवटी, ते पिकांचे पोषण करते, कापणी सुनिश्चित करते. या लेखात मी तुम्हाला बाली तलावांबद्दल मनोरंजक काय आहे, ते कसे तयार झाले, पारंपारिक स्थानिक संस्कृतीत त्यांचे काय महत्त्व आहे ते सांगेन.
बेटावर
अनेक आकर्षणे आहेत, या साइटवर ते सर्व श्रेणींमध्ये विभागले गेले आहेत.
आता तुम्ही "लेक्स" विभागात आहात. दुसर्या श्रेणीमध्ये जाण्यासाठी,
"श्रेणीनुसार ठिकाणे" ब्लॉकमध्ये ते निवडा. तुम्ही "सर्व ठिकाणे" विभागात
आकर्षणांची संपूर्ण यादी पाहू शकता.
तलावांची सामान्य वैशिष्ट्ये
बालिनीजमध्ये, "लेक" "दानौ" (दानौ) सारखा आवाज येतो. नावाची मुळे प्राचीन संस्कृतमध्ये परत जातात, जिथे "डी अनु" शब्दाचा अर्थ "ओलावा" असा होतो.
बेटावरील चार तलावांना खालील नावे आहेत:
त्यापैकी प्रत्येकास अशा पॅरामीटर्सद्वारे दर्शविले जाऊ शकते जसे:
- स्थान आणि परिमाणे
- मूळ
- सांस्कृतिक आणि धार्मिक महत्त्व
- इकोलॉजी
स्थान आणि परिमाणे
सर्वात मोठा तलाव बतूर आहे, सर्वात लहान तांबलिंगन आहे. ते सर्व बेटाच्या पूर्व आणि उत्तरेस स्थित आहेत.
त्यांचे स्थान आणि आकार याबद्दल काही मूलभूत माहिती येथे आहे:
- हे बांगली जिल्ह्याच्या ईशान्य भागात स्थित आहे - किंतामणी जिल्हा.
- समुद्रसपाटीपासूनची उंची - 1061 मीटर
- क्षेत्रफळ - 1 6 किमी²
- कमाल खोली - 70 मीटर
.jpg)
.jpg)
.jpg)
- हे तलाव तबानान जिल्ह्यात त्याच नावाच्या ज्वालामुखीच्या पूर्वेकडील पायथ्याशी आहे.
- समुद्रसपाटीपासूनची उंची - 123 1 मीटर
- क्षेत्रफळ - 3.8 किमी²
- कमाल खोली - 35 मीटर
.jpg)
.jpg)
.jpg)
- हे बेटाच्या सर्वात उत्तरेकडील जिल्ह्यात स्थित आहे - बुलेलेंग.
- समुद्रसपाटीपासूनची उंची - 1190 मीटर
- क्षेत्रफळ - 3.6 किमी²
- कमाल खोली - 85 मी
.jpg)
.jpg)
.jpg)
- हे तलाव बुयानच्या पूर्वेस एक किलोमीटरहून कमी अंतरावर आहे.
- समुद्रसपाटीपासूनची उंची - 1200 मीटर
- क्षेत्रफळ - 1.9 किमी²
- कमाल खोली - 88 मीटर
.jpg)
.jpg)
मूळ
बालीमधील पर्वतीय तलाव ज्वालामुखी उत्पत्तीचे आहेत. ते दोन कॅल्डेरामध्ये स्थित आहेत. बतूर सरोवराजवळ एक तरुण कॅल्डेरा. एकाच नावाच्या ज्वालामुखीच्या दोन उद्रेकाच्या परिणामी ते तयार झाले. यातील पहिला 3,000 वर्षांपूर्वी आणि दुसरा 20,000 वर्षांपूर्वी घडला. लावा सोडल्यानंतर, ज्वालामुखीच्या खाली व्हॉईड्स दिसू लागले, ज्यामध्ये पृथ्वीच्या पृष्ठभागाचे प्रचंड भाग पडले. मग कॅल्डेराचा काही भाग पाण्याने भरला - आणि बतूर तलाव दिसला.
.jpg)
प्राचीन चतुर ज्वालामुखीच्या जागेवर तीन उत्तरेकडील तलाव उद्भवले, जे एकेकाळी 3-4,000 मीटर उंचीवर पोहोचले होते. संभाव्यतः, त्याचा उद्रेक 100,000 वर्षांपूर्वी झाला होता. जुना काल्डेरा बतूर जवळील पेक्षा मोठा आहे. अयशस्वी झाल्यानंतर, एक प्रचंड रिंग तयार झाली, जी आता उष्णकटिबंधीय जंगलाने आच्छादित पर्वत आणि टेकड्यांसह रिजसारखे दिसते.
कदाचित, सुरुवातीला, सर्व तीन उत्तर बाली तलाव एकात एकत्र केले गेले. मग, भूकंप किंवा इतर आपत्तीच्या परिणामी ते वेगळे झाले. हे निश्चितपणे ज्ञात आहे की 1800 पर्यंत बुयान आणि तांबलिंगन हे एकच पाणी होते. ब्रोबद्दल अशी कोणतीही माहिती नाही.
.jpg)
तलावांच्या ज्वालामुखीच्या उत्पत्तीमुळे, त्यांच्यामध्ये मीठाचे प्रमाण जास्त आहे. हे विशेषतः सक्रिय ज्वालामुखीच्या शेजारी स्थित बटुर्लॉकेट आहे. तलावांजवळ अनेक थर्मल स्प्रिंग्स आहेत. हे देखील या क्षेत्रातील जमिनीच्या उच्च भूवैज्ञानिक क्रियाकलाप दर्शवते. सर्व तलाव टेकड्या आणि पर्वतांनी वेढलेले आहेत, त्यापैकी बरेच पूर्वीचे ज्वालामुखी आहेत.
.jpg)
बाली लोकांसाठी तलावांचे महत्त्व
मी म्हटल्याप्रमाणे, चारही जलाशय बेटाच्या लोकसंख्येच्या जीवनात महत्त्वाची भूमिका बजावतात. आता मी तुम्हाला याबद्दल अधिक सांगेन.
तलाव समाजाच्या अशा पैलूंशी जवळून जोडलेले आहेत:
- धर्म
- इतिहास आणि संस्कृती
- अर्थव्यवस्था
आता प्रत्येकाबद्दल अधिक
धर्मात
पाणी, प्रामुख्याने ताजे, बेटावरील रहिवाशांसाठी पवित्र आहे. ते पिकांना जीवन देते; त्याशिवाय, मौल्यवान तांदूळ, ज्याला एक पवित्र संस्कृती देखील मानली जाते, पिकवता येत नाही. ओलावा शरीर आणि आत्मा शुद्ध करण्यासाठी कार्य करते. चार तलावांव्यतिरिक्त, बेटावर ताजे पाण्याचे कोणतेही स्रोत नसल्यामुळे, त्यांच्याकडे पाहण्याचा दृष्टीकोन विशेष आहे.
तर, प्रत्येक तलावाजवळ एक किंवा अधिक मंदिरे आहेत. सर्वात लक्षणीय बतुर आणि ब्राटन (उलुन दानु मंदिर) जवळ स्थित आहेत, ते देवी दानू यांना समर्पित आहेत. इतर सर्व एक प्रकारे किंवा दुसर्या प्रकारे संबंधित आहेत. हिंदू धर्मातील देवी दानू हे विश्वातील आदिम आर्द्रतेचे मूर्त स्वरूप आहे. प्राचीन हिंदू धर्मात, देवी दानूला अराजक आणि दुष्काळ वित्राच्या राक्षसाची आई मानली जात होती, जिला त्याच्या सर्वात वाईट शत्रू इंद्राने मारले होते. नंतरच्या आवृत्त्यांमध्ये, देवी ही दक्षाची कन्या आहे आणि दैवी ऋषी कश्यप (चेर एपखी) ची पत्नी आहे, ज्यांच्यापासून सर्व सजीवांची उत्पत्ती झाली.
मंदिरांजवळ धार्मिक समारंभ सतत होत असतात (तसे, तलावातील पाणी त्यांच्यासाठी आवश्यक आहे). देवीला भेटी देईपर्यंत स्थानिक लोक भात पेरायला आणि भाज्या लावायला सुरुवात करत नाहीत. अनेकदा किनाऱ्यावर तुम्ही लोकांचे गट प्रार्थना आणि ध्यान करताना पाहू शकता. अगदी शेजारच्या बेटांवरूनही श्रद्धावान तलावावर येतात.
.jpg)
.jpg)
.jpg)
.jpg)
.jpg)
.jpg)
.jpg)
मंदिरे देखील सिंचन व्यवस्थेचा एक महत्त्वाचा भाग आहेत. पाणी त्यांच्या क्षेत्रावर वितरीत केले जाते, त्यानंतरच ते तांदूळ टेरेसवर वाहते. पावसाळ्यात काही मंदिरांना पूर येतो. उच्च आर्द्रतेमुळे त्यांच्या भिंती अनेकदा मॉस आणि गवताने झाकल्या जातात. याचा अर्थ असा नाही की बाली लोक त्यांच्या देवस्थानांची काळजी घेऊ इच्छित नाहीत. धार्मिक नियम त्यांच्या घरातील देवतांना पुन्हा त्रास देऊ देत नाहीत.
इतिहास आणि संस्कृती मध्ये
धार्मिक व्यतिरिक्त, बेटावरील रहिवाशांसाठी तलावांना ऐतिहासिक आणि सांस्कृतिक महत्त्व आहे. फार पूर्वी नाही, इतिहासकारांना तांबलिंगन परिसरात कलाकृती सापडल्या, ज्यावरून असे दिसून येते की बालिनी संस्कृतीची सुरुवात येथेच झाली.
सर्वसाधारणपणे, बेटाचे पहिले रहिवासी ताज्या पाण्याजवळ स्थायिक झाले असे मानणे तर्कसंगत असेल. याचे खरे पुरावेही आहेत. उदाहरणार्थ, 18 व्या शतकात तलावांच्या परिसरात अद्वितीय सुबाक सिंचन प्रणालीची उत्पत्ती झाली. आणि बतुर जवळ स्थानिक लोकांपैकी सर्वात जुन्या वस्तींपैकी एक आहे - बाली आगा.
शेतावर
जवळच्या वसाहतींच्या शेतीसाठी तलाव अत्यंत महत्त्वाचे आहेत. त्यांच्याकडील पाणी घरगुती गरजांसाठी आणि पिण्यासाठी वापरले जाते. तलावांमध्ये भरपूर मासे आहेत, जे केवळ स्थानिक रहिवाशांच्या जेवणासाठीच नव्हे तर शेजारच्या रेस्टॉरंटमध्ये विक्रीसाठी देखील वापरले जातात.
.jpg)
.jpg)
.jpg)
.jpg)
तलावांचे पर्यावरणशास्त्र
तलावांचे स्फटिकासारखे स्वच्छ पाणी हे वास्तवापेक्षा भूतकाळातील स्मृतीसारखे आहे. पर्यटन व्यवसायाचा झपाट्याने होणारा विकास, लोकसंख्या वाढ, शेतजमिनीची सघन मशागत, कीटकनाशकांचा वापर, तलावांच्या किनाऱ्यावरील अविकसित गटारे हे प्रदूषणाचे मुख्य कारण आहे. उदाहरणार्थ, अलीकडील अभ्यासातून असे दिसून आले आहे की बतूर सरोवरातील पाणी आता पिण्यासाठी योग्य नाही - फक्त जमीन सिंचनासाठी. हे जड धातूंचे वाढलेले प्रमाण, सेंद्रिय प्रदूषण प्रकट करते. सरकारच्या आवाहनानंतरही स्थानिक रहिवासी या तलावाचे पाणी पीत आहेत.
बालीमध्ये प्रदूषण आणि जलस्रोतांच्या अतिवापराची समस्या अधिकाधिक निकडीची होत आहे. मोठ्या प्रमाणात पाणी पर्यटन स्थळांना निर्देशित केले जाते, परिणामी, शेतात आणि बागा सुकतात, पारंपारिक शेती कमी होत आहे. काही भागातील स्थानिक रहिवाशांना घरगुती गरजांसाठीही पाण्याची कमतरता जाणवते, त्याच्या गुणवत्तेवर चर्चा करणे योग्य नाही. त्याच वेळी, तलावांमधील पाण्याच्या पातळीत घट नोंदवली गेली नाही, उलटपक्षी, काहींमध्ये वाढ झाली आहे.
दुसरी समस्या गहन मासेमारी आहे. तलावांच्या किनाऱ्यावरील रहिवाशांची संख्या वाढत आहे, अधिकाधिक हॉटेल्स आणि रेस्टॉरंट्स उघडत आहेत जिथे आपण मासे विकू शकता. कीटकनाशकांच्या प्रदूषणामुळे सरोवरातील जीवजंतू कमी होत आहेत. वेळोवेळी मोठ्या प्रमाणावर मासे मृत्युमुखी पडल्याच्या बातम्या येत असतात. सर्व प्रथम, या समस्या बतूर तलावाशी संबंधित आहेत. ज्वालामुखीच्या क्रियेमुळे होणारे रासायनिक प्रदूषण, कृषी कचऱ्याच्या पाण्यामध्ये प्रवेश करून पूरक, भविष्यात पर्यटनाचा वेगवान विकास पर्यावरणीय आपत्तीमध्ये बदलू शकतो.
.jpg)
.jpg)
नकाशावर तलाव
1 किमी 5 किमी 10 किमी 25 किमी 50 किमी 75 किमी 100 किमी 150 किमी 200 किमी 300 किमी
कोणत्याही श्रेणी आढळल्या नाहीतया स्थानावर कोणतेही परिणाम आढळले नाहीत. कृपया पुन्हा प्रयत्न करा.
मार्ग तयार करत आहे...
तलावांवर करण्यासारख्या गोष्टी
मी तुम्हाला तलावांना भेट देण्यासाठी काही दिवस समर्पित करण्याचा सल्ला देतो. तुम्ही बतुरपासून सुरुवात करू शकता, नंतर उत्तरेकडे जाऊ शकता. प्रवास खूप मनोरंजक आणि वैविध्यपूर्ण असल्याचे वचन देतो.
येथे उपलब्ध मनोरंजनाचे प्रकार येथे आहेत:
- किनाऱ्यावर चालतो
- नौकाविहार किंवा catamaran
- मासेमारी
- गरम पाण्याच्या झऱ्यात आंघोळ
- सक्रिय आणि नामशेष ज्वालामुखीच्या शिखरावर चढणे
- मंदिरांना भेटी देतात
- समारंभ पाहणे
- शेजारच्या शेतात आणि भाताच्या शेतांना भेटी
आता मी सर्वात मनोरंजक क्रियाकलापांबद्दल बोलेन:
हायकिंग आणि ट्रेकिंग
सर्व ज्वालामुखी तलाव अतिशय सुंदर आहेत. आपण आधीच वाटेत पाण्याच्या पृष्ठभागाची प्रशंसा करू शकता, कारण तलाव दरीमध्ये आहेत. रस्ते आणि पथांजवळ बाहेरील भागांसह कॅफे आहेत जे पाण्याची सुंदर दृश्ये देतात. आजूबाजूच्या टेकड्या देखील अतिशय नयनरम्य आहेत, काही जंगलाने भरलेल्या आहेत, तर काहींवर तुम्हाला फळबागा आणि तांदळाच्या टेरेस दिसतात.
.jpg)
.jpg)
.jpg)
.jpg)
.jpg)
.jpg)
.jpg)
सर्व तलाव वेगवेगळ्या उंचीच्या पर्वतांनी वेढलेले आहेत. तुमची इच्छा असेल तर तुम्ही एखादे शिखर चढू शकता. सर्वात लोकप्रिय चढाई म्हणजे बतुर पर्वत. लेसुंग (तांबलिंगन सरोवराजवळ) आणि चतुर (ब्र अतान सरोवराजवळ) येथेही पर्यटन मार्ग आहेत.
.jpg)
.jpg)
.jpg)
नौकाविहार आणि मासेमारी
बोट ट्रिप हा पर्यटकांच्या आवडत्या मनोरंजनांपैकी एक आहे. मी फक्त हे लक्षात घेईन की काही तलावांवर मोटार वाहनांना मनाई आहे, येथे ते फक्त ओअर्सवर पोहतात. तुमची इच्छा असल्यास, तुम्ही किनाऱ्यावर फिशिंग रॉड घेऊन बसू शकता किंवा तलावाच्या मध्यभागी असलेल्या बोटींवर मासेमारी करण्यासाठी स्थानिकांपैकी एकासह व्यवस्था करू शकता.
.jpg)
.jpg)
.jpg)
.jpg)
गरम पाण्याच्या झऱ्यात आंघोळ
बाली बेटावर अनेक तलाव आहेत, ज्यांना मी या देशाच्या प्रवासाची योजना आखणाऱ्या प्रत्येक पर्यटकाला भेट देण्याची शिफारस करतो. तलाव विशेष स्वारस्यपूर्ण आहेत, कारण अशा तुलनेने लहान बेटावर त्यापैकी चार आहेत: तांबलिंगन, बुयान, ब्राटन, बतुर. त्यांच्यापैकी प्रत्येकाचे मूळ, इतिहास आणि स्थानिक लोकांच्या जीवनावर आणि जीवनावर प्रभाव आहे.
बालीमध्ये अस्तित्वात असलेल्या जलाशयांमध्ये हा सर्वात मोठा जलाशय आहे. त्याच्या ताज्या पाण्याचा पुरवठा बहुतेक बेटाला होतो. इतरांप्रमाणे, ते ज्वालामुखी मूळ आहे. बतुर हे बांगली जिल्ह्याच्या ईशान्य भागात आहे. हे सुमारे 8 किमी रुंद आणि 3 किमी लांब आहे. ज्वालामुखीच्या उद्रेकानंतर तलाव उदासीनतेत तयार झाला असल्याने, त्याची प्रभावी खोली आहे: किनारपट्टीवर सुमारे 3 मीटर आणि मध्यभागी 70 मीटर जवळ पोहोचते.
या जलाशयाच्या देखाव्याबद्दल अनेक दंतकथा आहेत. स्थानिकांचा असा दावा आहे की तलावाच्या तळाशी 11 झरे आहेत जे वर्षभर तलावाला पाणी देतात. आणि जरी ऋतू व्यावहारिकदृष्ट्या पाऊसविरहित असतो, तरीही त्यातील पाण्याची पातळी अजिबात कमी होत नाही.

त्या काळात, जेव्हा तलाव अद्याप अस्तित्वात नव्हता, त्याच नावाचे एक गाव त्याच्या जागी होते. पूर आल्यावर स्थानिकांनी ते उतारावरून हलवले. ते आजपर्यंत अस्तित्वात असल्याचे सांगितले जाते.
गावे संपूर्ण किनार्यावर वसलेली आहेत, ती केवळ उत्तरेकडेच नाहीत, कारण तेथे सरोवर अगदी खडकाच्या जवळ आहे. जवळच सक्रिय ज्वालामुखी आहे. त्याच्या उद्रेकामुळे अनेकदा शेतीचे लक्षणीय नुकसान होते, कारण पाणी गंधकाने भरलेले असते, ज्यामुळे अनेक मासे मारले जातात आणि पाणी केवळ वापरासाठीच नाही तर शेतात सिंचनासाठी देखील अयोग्य बनते.

या तलावात पोहण्यास सध्या मनाई आहे. या तलावाच्या पाण्याने अजूनही काही शेतात सिंचन केले जात असले तरी शेतीच्या कामांना त्याचा फटका बसला आहे.
परंतु या नाण्याची आणखी एक बाजू आहे: वारंवार ज्वालामुखीच्या उद्रेकामुळे, माती ट्रेस घटकांनी भरलेली असते, परिणामी बालीनी कापणी दोनदा आणि कधीकधी तीन वेळा होते.
बेटाच्या या प्रदेशात आल्यावर, तुम्ही नैसर्गिक लँडस्केपचा आनंद घेऊ शकता, तलावाच्या बाजूने फिरू शकता आणि अर्थातच, बतुरच्या भव्य ज्वालामुखीवर चढू शकता. सध्या, हे युनेस्को जिओपार्क्स सिस्टममध्ये समाविष्ट आहे, ज्यामुळे स्थानिक प्राणी तसेच वनस्पतींची लोकसंख्या जतन केली जाते.
लेक ब्रो
मागील प्रमाणेच, ज्वालामुखीच्या उद्रेकानंतर लेक ब्रॅटन तयार झाला, ज्याने भूप्रदेशातील बदलास हातभार लावला. हे जगातील सर्वात मोठे विवर तलाव आहे, ज्याने यूएस क्रेटर लेक देखील ओलांडले आहे.
हा जलाशय 2 किमी लांबीचा आणि रुंदीच्या अंदाजे समान आहे. परंतु त्याची कमाल खोली केवळ 35 मीटर आहे. स्थानिक लोक ब्रॅटनची मूर्ती करतात आणि त्याला पवित्र पर्वताचे तलाव म्हणतात, कारण ते भाताच्या शेतात सिंचनाचा स्रोत आहे.

एक आख्यायिका आहे की जर तुम्हाला तारुण्य वाढवण्याची आणि आयुष्य वाढवण्याची इच्छा असेल तर, जेव्हा सूर्यकिरण जमिनीला स्पर्श करू लागले आहेत तेव्हा तुम्हाला जलाशयाच्या पाण्यात उडी मारणे आवश्यक आहे.
या आख्यायिकेमुळेच येथे पर्यटकांची गर्दी होते. परंतु या ठिकाणाच्या लोकप्रियतेचे हे एकमेव कारण नाही.

येथे आल्यावर, या पवित्र स्थानाच्या काठावर असलेल्या उलुन दानु मंदिराला भेट देण्यासारखे आहे. त्याचे 11 स्तर आहेत, त्यापैकी काही पाण्यात आणि पाण्याच्या वर आहेत. त्यापैकी प्रत्येक देवाच्या सन्मानार्थ बांधला गेला होता. बालीनी लोक अनेकदा येथे येतात, भेटवस्तू देतात आणि समृद्ध पीक, दीर्घायुष्य आणि कौटुंबिक आनंदासाठी विविध देवतांना प्रार्थना करतात.
तलावाच्या आजूबाजूला एक आकर्षक बोटॅनिकल गार्डन तयार करण्यात आले आहे, ज्याला भेट देऊन तुम्ही बोटिंग, वॉटर स्कीइंग आणि मोहक लँडस्केपची प्रशंसा करण्यासाठी ऑफरचा लाभ घेऊ शकता.
लेक बुयान
हे बेटाच्या उत्तरेकडील बाजूला समुद्रसपाटीपासून 1119 मीटर उंचीवर स्थित आहे. त्यामुळे दिवसा उष्णतेपासून रात्री थंडीपर्यंत धुके आणि तापमानातील चढ-उतार येथे नियमितपणे दिसून येतात. एकदा ते तांबलिंगनसह एकच तलाव होते. परंतु भूकंपाच्या क्रियेमुळे, त्यांच्यामध्ये एक इस्थमस तयार झाला, ज्याने त्यांना दोन भागात विभागले. आताही, बालीनीज कधी कधी त्यांना जुळे तलाव किंवा दुहेरी तलाव म्हणतात.
त्याच्या समकक्षांच्या तुलनेत, बुयान आकाराने लहान आहे, त्याचे क्षेत्रफळ फक्त 3.5 चौरस मीटर आहे. किमी, आणि मध्यभागी खोली 85 मीटर आहे. तलावाच्या चारही बाजूंनी घनदाट जंगले वेढलेली आहेत, परंतु असे असूनही, एक रस्ता डोंगराच्या बाजूने जातो, ज्यावर निरीक्षण प्लॅटफॉर्म तयार केले गेले आहेत जे तुम्हाला तलाव आणि जवळपासची गावे पाहू शकतात. याव्यतिरिक्त, तेथे कॅफे आहेत जेथे आपण स्थानिक पाककृतीचा आनंद घेऊ शकता आणि ट्रिपमधून विश्रांती घेऊ शकता.

बुयानच्या आग्नेयेला एक गाव आहे ज्याच्या आजूबाजूला फळे आणि भाजीपाला तसेच कॉफी पिकवणारी अनेक शेते आहेत. तुम्ही त्यांना भेट देऊ शकता आणि स्थानिक लोकांना जाणून घेऊ शकता.
बेटावरील सर्व विद्यमान तलावांपैकी एक तलाव सर्वात स्वच्छ मानला जातो. म्हणून, त्याला काळजीपूर्वक पहारा देण्यात आला आहे आणि मोटार वाहनांमध्ये बसण्यास मनाई आहे. मच्छिमार भरीव लाकडांपासून बनवलेल्या बोटीतून बॅकवॉटरमध्ये प्रवास करून मासे पकडतात.
तांबलिंगन तलाव
या तलावासाठी, हे चार तलावांपैकी सर्वात लहान आहे आणि स्थानिक लोक पवित्र मानतात. त्याच्या नावात दोन शब्द आहेत आणि त्याचे भाषांतर "तांबा" - उपचार आणि "एलिंगन" - आध्यात्मिक उपचार म्हणून केले जाते.
अशी आख्यायिका आहे की प्राचीन काळात गावावर एका रोगाने हल्ला केला होता ज्याने केवळ स्थानिक रहिवासीच नव्हे तर प्राणी देखील मारले होते. आणि मंदिराच्या सेवकांच्या प्रार्थनेसह तलावाच्या पाण्यात फक्त आंघोळ केल्याने लोकांना बरे होऊ शकते आणि त्यांना पूर्णपणे नामशेष होण्यापासून वाचवता आले. याव्यतिरिक्त, ते स्वच्छतेमध्ये अग्रगण्य स्थान व्यापलेले आहे.

Tamblingan समुद्रसपाटीपासून 1200 मीटर उंचीवर लेसुंग पर्वताच्या उतारावर स्थित आहे. तलाव 2 किमी लांब आणि 1.1 किमी रुंद आहे. परंतु त्याच वेळी, त्याची खोली सर्वात मोठी आहे आणि 90 मीटरपर्यंत पोहोचते. इतर जलाशयांप्रमाणे, येथे मोटर बोट वापरण्यास मनाई आहे. आजूबाजूच्या गावातील रहिवासी मासेमारीसाठी लाकडी नांग्याचा वापर करतात.
तांबलिंगन हे सर्वात जास्त वाहणारे तलाव आहे. पावसाळ्यात, त्याचे पाणी त्यांच्या काठावर ओसंडून वाहते आणि सर्व शेतात आणि काही गावांमध्ये पूर येतात. या घटनेमुळे, बर्याच बालीनी लोकांनी त्यांची निवासस्थाने उंच आणि अधिक दूरच्या उतारांवर हलवली.

शेजारच्या तलावांप्रमाणे, हे पर्यटकांसाठी इतके लोकप्रिय ठिकाण नाही, कारण तिथे जाणे कठीण आहे. परंतु, असे असले तरी, कॅफेसह तपासणीसाठी साइट्स आहेत, जिथे आपण केवळ स्थानिक राष्ट्रीय पाककृतीच चाखू शकत नाही तर काही विदेशी फळे देखील खरेदी करू शकता.
रेन फॉरेस्टमध्ये, उतारावर स्थित, हायकिंग ट्रेल्स आहेत ज्यावर तुम्ही चालत जाऊ शकता आणि माकडे पाहू शकता. ते फारसे मैत्रीपूर्ण नसतात, परंतु ते जवळून जाणाऱ्या पर्यटकांकडे रसाने पाहतात. किनार्यावर जलदेवता दानूचे मंदिर देखील आहे.
नकाशावर बाली तलाव
या नकाशावर तुम्हाला वर्णन केलेल्या सर्व तलावांचे अचूक स्थान सापडेल.
बाली बेटाच्या या 4 तलावांमध्ये बेटवासीयांचे सर्व ताजे पाण्याचे साठे आहेत, जे त्यांना पिकांना सिंचन करण्यासाठी आणि त्यांचे सर्व जीवन कार्ये पार पाडण्यासाठी आवश्यक आहेत. म्हणूनच ते विशेष काळजी घेऊन त्यांचे संरक्षण करतात. येथे आकर्षक हायकिंग ट्रेल्स आहेत जे भेट देण्यासारखे आहेत. नैसर्गिक लँडस्केपचे सौंदर्य या खरोखर पवित्र स्थानांना भेट दिलेल्या कोणत्याही व्यक्तीला उदासीन ठेवणार नाही.
त्याच नावाच्या तलावासह, आणि आता बेटावरील सर्वात मोठ्यापैकी एक, गिट-गिट धबधबा, सुंदर आणि स्वच्छ लेक ब्रॅटन आणि पाण्याच्या लँडस्केपमध्ये सामंजस्याने बसणारे लहान पुरा उलुन दानू मंदिर याबद्दल बोलूया.
आम्ही
बालीमधील सर्व धबधब्यांबद्दल तपशीलवार लेख देखील लिहिला आहे, त्यात
धबधब्यांच्या समन्वयांसह नकाशा देखील आहे. तुम्ही लेख वाचू शकता.
गिट-गिट धबधबा बालीच्या उत्तरेस सिंगराजा शहराच्या दक्षिणेस 10 किमी अंतरावर आहे.
मोठ्या नकाशात बाली पहा
रस्त्यावरून
धबधबा दिसत नसला तरीही, तो चुकणे कठीण आहे - पार्किंग लॉट्ससह तेथे अनेक
प्रवेशद्वार आहेत, ज्यात कर्तव्यावर मार्गदर्शक आहेत, परंतु त्याउलट, ते
येथे इतके अनाहूत नाहीत. पर्यटकांच्या प्रवेशद्वारावर, स्मरणिका ट्रिंकेट
विकणारे तरुण उद्योजक पहारा देत आहेत.
गाईडची सेवा नाकारून आणि प्रवेशासाठी ५ हजार रुपये ($०.५) देऊन आम्ही धबधब्याशी ओळख करून घ्यायला गेलो. गिट-गिट धबधबा हा विविध आकारांच्या धबधब्यांची मालिका आहे, एकमेकांपासून कित्येकशे मीटर अंतरावर आहे. आम्ही आमचा मार्ग माथ्यावरून सुरू केला, त्यामुळे धबधब्याच्या पायथ्यापर्यंत ट्रेकिंगला सुमारे एक तास लागला (एक मार्ग).
नयनरम्य मार्ग आणि हिरवाईने नटलेले डोंगर,
वादळी वनस्पती आणि रंगीबेरंगी फुले - हे सर्व डोळ्यांना मोहित करते आणि आनंदित करते
पायवाट
एका छोट्या स्थानिक वस्तीतून जाते. घरांच्या पुढे, आम्हाला "पिवळ्या
शेतात" रस होता - प्रथम आम्ही ठरवले की तांदूळ जमिनीवर, सूर्याखाली,
नेहमीप्रमाणे सुकत आहे, परंतु विशिष्ट वासाने लक्ष वेधून घेतले, आम्ही जवळ
आलो आणि असे दिसून आले की ते कार्नेशन होते
एक
छोटासा तलाव-कडगा, जिथे धबधब्याचे वाजणारे जेट्स गोंगाटाच्या प्रवाहात
वाहत होते, ते खूप थंड होते, त्यामुळे उष्णतेमध्येही त्यात चढण्याची इच्छा
नव्हती.
ताज्या थंडीचा आनंद घेत आम्ही जंगलाच्या वाटेने निघालो, असंख्य शिड्या, स्विंग ब्रिजसह
आणि एकाकी आर्बर,
कॅस्केड गिट-गिट धबधब्याकडे
परत
येताना, त्यांनी जंगली हेरिंग निवडले, जे नंतर माकडांना खायला द्यावे
लागले, कारण ते अपरिपक्व होते आणि त्यांचे तोंड पर्सिमन्ससारखे विणले होते.
बालीमधील
सालक हे आमच्या आवडत्या फळांपैकी एक बनले आहे, म्हणून आम्हाला ते
रस्त्यावर खरेदी करण्यात आनंद झाला, हळू हळू, फक्त परिचित आकार लक्षात घेऊन
म्हणून,
एके दिवशी, आम्ही रस्त्याच्या कडेला असलेल्या एका स्टॉलवर थांबलो आणि एका
आनंदी विक्रेत्याने आम्हाला त्याची फळांची लागवड पाहण्यासाठी आमंत्रित
केले. येथे, आम्ही प्रथमच हेरिंग (उर्फ साप फळ) कसे वाढते ते पाहिले.
आमच्या पुस्तकात या फळासाठी आणखी काय मनोरंजक आणि उपयुक्त आहे याबद्दल आपण
वाचू शकता.
लेक्स Buyan आणि Bratan
गिट गीट धबधब्यापासून फार दूर नाही, दक्षिणेला काही किलोमीटरवर, त्याच रस्त्यालगत, ब्रॅटन, बुयान आणि तांबलिंगन (ब्रौटन, बुयान, तांबलिंगन) अशी तीन अद्भुत तलाव आहेत.
बालीमध्ये ब्रॅटन सरोवर पवित्र मानले जाते, ते समुद्रसपाटीपासून 1.2 किमी उंचीवर माउंट गुनुंग कातूरच्या पायथ्याशी आहे आणि हिरवेगार विदेशी वनस्पतींनी वेढलेले आहे.
लेक बुयान, जरी पवित्र नसले तरी रस्त्यावरून चित्तथरारक दृश्ये देतात

तलावाच्या आजूबाजूला अनेक शेतात फळे पिकवली जातात.
आम्ही वरून बुयानचे कौतुक केले,
दर्याच्या काठाने जाणा-या रस्त्याने चालत जाणे, आत्ता आणि नंतर दृश्यांचे कौतुक करणे,
विरुद्ध बाजूला पर्वत
आणि डोळ्यांना मोकळी जागा
इथे रस्ता ओलांडून रस्त्याच्या कडेला असलेल्या वारुंगमध्ये जेवण केले
खुष,
थेट टेबलवरून उघडले, शेजारच्या शेजारचे दृश्य, हिरवाईत बुडलेले. आम्ही
प्रयत्न केलेल्या स्थानिक पदार्थांबद्दल आम्ही बोललो, परंतु येथे व्यंजन
पर्यटकांसाठी अनुकूल झाले आहेत आणि वारुंगमधील किंमती देखील पर्यटक आहेत -
प्रति डिश 25-30 हजार रुपये. मला विशेषतः चॉकलेट चिप्स, नट्स, कंडेन्स्ड
मिल्क, स्ट्रॉबेरी, केळी आणि चीज असलेले मार्तबाक (फ्लफी पॅनकेक) आवडले 🙂
समाधानी आणि भरलेल्या, आम्ही बेटाच्या मुख्य जलमंदिराला भेट देण्यासाठी ब्रॅटन सरोवराच्या किनाऱ्याच्या रस्त्याने निघालो.
वाटेत
आम्हाला माकडांचा कळप भेटला, आणि जरी आम्ही त्यांना पुरेशा प्रमाणात
पाहिले असले तरी, आम्ही थांबण्याचा प्रतिकार करू शकलो नाही.
इथे माकडांनी आम्हाला त्यांचा खरा आणि नेहमीच गोंडस चेहरा दाखवला.
तलावाच्या प्रवेशद्वारावर स्ट्रॉबेरी विकणे
या
भागांमध्ये अनेक स्ट्रॉबेरी लागवड आहेत (आम्ही अशाच ठिकाणी होतो). येथे
ताज्या स्ट्रॉबेरीच्या पॅकेजची किंमत 25 हजार रुपये आहे, तसे, उबुडमध्ये,
अशा पॅकेजिंगची किंमत 15 हजार रुपये आणि 10 हजार आहे. वरवर पाहता
ताजेपणासाठी जास्त पैसे द्यावे लागतील =)
एक
प्राचीन आख्यायिका आहे, त्यानुसार, ब्रॅटन तलावाच्या पाण्यात स्नान करणारे
सर्व, म्हणजे. ज्यांनी शुद्धीकरण प्रक्रिया पार केली आहे, त्यांना तारुण्य
आणि दीर्घायुष्याची अपेक्षा आहे. हे एक पवित्र तलाव आहे, बाली लोक त्याचा
खूप आदर करतात आणि वर्षातून एकदा स्नान करण्यासाठी येथे येणे आपले कर्तव्य
मानतात.
तलावाची
देवी दानू आहे, ती दररोज सकाळी, आणि विशेषत: उत्सव समारंभात, स्थानिक लोक
उदारतेने अर्पण करतात आणि चांगली कापणी आणण्यासाठी तिच्या शक्तीला
प्रार्थना करतात.
आम्ही त्यात पोहलो नाही, आमचा समुद्रकिनारा गावात आहे, परंतु तो कसा तरी अधिक आनंददायी आहे.
किनार्यावर तामन रेक्रेसी बेदुगुल एक आधुनिक मनोरंजन उद्यान आहे, जे पाहुण्यांना बोटीच्या प्रवासाची ऑफर देते,
नौका आणि इतर जल आकर्षणे
मंदिर पुरा उलुं दानु ब्रतन
मंदिराच्या प्रदेशात प्रवेश - 30 हजार रुपये
मंदिर,
तसेच तलाव, प्रजननक्षमतेच्या देवी दानाचे गौरव करते, जिची येथे प्रार्थना
केली जाते, तिची कृपा मागितली जाते, भरपूर अर्पण केले जाते आणि तांदळाची
चांगली कापणी मागितली जाते.
मोठ्या संख्येने लोकांनी आम्हाला आश्चर्यचकित केले नाही - बेटाच्या पर्यटन केंद्रापासून आणि समुद्रकिनार्यापासून मंदिर दूर असूनही, ते दुसरे सर्वात लोकप्रिय आहे (नंतर
बेदुगुल हे बालीच्या मध्यवर्ती भागात उंच प्रदेशातील एक लहान शहर आहे. त्याच्या आजूबाजूचा परिसर त्यांच्या विस्मयकारक सौंदर्यासाठी प्रसिद्ध आहे: येथे आकर्षक पर्वत शिखरे आणि कडा, वळणदार रस्ते आणि हिरव्यागार जंगलाने झाकलेले ज्वालामुखीच्या उताराच्या बाजूने जाणारे मार्ग, धुक्याच्या धुक्यात शांत पर्वत तलाव, छोटी गावे आहेत. खेळकर सूर्य, एकतर त्याच्या उदार प्रकाशाने सभोवतालच्या सर्व गोष्टींना पूर आणतो किंवा ढगांच्या मागे लपतो. फळे, भाज्या, फुले आणि मसाले येथे मुबलक प्रमाणात पिकतात. येथे स्ट्रॉबेरीची मोठी लागवड आहे. स्थानिक बाजारपेठा रंग आणि विदेशी चवींचे उत्सव आहेत. झाडे, फुले आणि पक्ष्यांच्या समृद्ध संग्रहासह आलिशान वनस्पति उद्यान.
येथे नयनरम्य आणि प्रभावशाली मंदिरे आहेत. प्रत्येकजण ज्यांच्याकडे कॅमेरा आहे ते येथे हजारो आश्चर्यकारक शॉट्स घेतील. हे बालीमधील सर्वोत्तम ठिकाणांपैकी एक आहे. येथे केवळ परदेशी पर्यटकांनाच यायला आवडते असे नाही, तर बालिनी लोकांनाही ते आवडते. ते उष्णता आणि आर्द्रतेपासून येथे पळून जातात, त्यांचा शनिवार व रविवार येथे घालवण्याचा कल असतो, आणि समुद्रकिनार्यावर अजिबात नाही.
तांदळाच्या टेरेसच्या अप्रतिम चमकदार हिरव्या टेबलक्लॉथच्या मागे साप चढत असलेल्या रस्त्यावर, आपण समुद्रसपाटीपासून जवळजवळ दीड किलोमीटर वर जातो.
कालदेरा चतुर
एकदा एक प्राचीन मेगा-ज्वालामुखी ब्रॅटन होता.
सुमारे 23 हजार वर्षांपूर्वी, त्याच्या विशेषत: शक्तिशाली उद्रेकानंतर, एक आपत्ती घडली: खड्डा आणि त्याच्या सभोवतालची माती पृथ्वीच्या खोलवर कोसळली, ज्यामुळे 11 बाय 6 किमी आकारमानाचा एक विशाल उदासीनता निर्माण झाला.
त्या दीर्घकाळ चाललेल्या प्रचंड स्फोटानंतर, कॅल्डेरामध्ये दुय्यम ज्वालामुखी निर्माण झाले. परंतु ते शेकडो आणि हजारो वर्षांपासून झोपलेले आहेत आणि आजूबाजूचा परिसर घनदाटपणे जंगलाने व्यापलेला आहे. हा परिसर त्याच्या सौंदर्यासाठी प्रसिद्ध आहे, चतुर कालदेरामध्ये कालांतराने तयार झालेले असंख्य गरम झरे आणि तलाव.
आता तीन तलाव आहेत - बालीचे तीन मोती. ते अगदी तशाच आहेत, म्हणून जेव्हा तुम्ही "माउंटन लेक" असे भावनेने उच्चारता तेव्हा तुमच्या कल्पनेत दिसणारी प्रतिमा.

बालीच्या नद्या आणि तलाव
अर्थात, या बेटावर डोंगरातून खाली वाहणाऱ्या नद्या आहेत. परंतु बालीमध्ये, या नद्या नाहीत, तर नाल्या आहेत - लहान, अरुंद, उथळ, परंतु त्याच वेळी वादळी, नेव्हिगेशनसाठी पूर्णपणे अयोग्य.
बाली तलाव ही पूर्णपणे वेगळी बाब आहे. हिरव्या फ्रेममध्ये त्यांचा आरशासारखा पृष्ठभाग बेटाच्या जवळ गेल्यावरही लक्ष वेधून घेतो. बालीमध्ये चार पवित्र तलाव आहेत.
ते सर्व गोड्या पाण्याचे आहेत. त्यांपैकी सर्वात मोठे, बतूर सरोवर, बतूर ज्वालामुखीच्या कॅल्डेरामध्ये आहे आणि इतर तीन चतुर कॅल्डेरामध्ये आहेत.
त्यापैकी दोघांची नावे - ब्रॅटन आणि बुयान - रशियन कानाला कसे तरी परिचित आणि मजेदार वाटतात, त्यांना आगाऊ लाच देणे आणि अनुकूल करणे. पण ते खरोखरच खूप सुंदर आणि अद्भुत दृश्यांनी वेढलेले आहेत. बालीमधील या तलावांबद्दल अनेक दंतकथा आणि अफवा आहेत. अशी अफवा आहे की येथे, प्राचीन काळी, प्राचीन राजांसाठी बनावट, आणि असा आरोप आहे की तलावाच्या तळाशी किंवा जवळपास कुठेतरी काही रहस्यमय आणि मनोरंजक कलाकृती सापडल्या होत्या ...
लेक बुयान, त्याच्या नावाच्या विरूद्ध, उथळ, शांत आणि शांत आहे. 19व्या शतकापर्यंत, बुयान आणि तांबलिंगन सरोवर हे एकच पाणी होते, परंतु भूकंपानंतर भूस्खलनाने जमिनीच्या अरुंद पट्टीने त्याचे दोन भाग केले.
ब्रॅटन सरोवर, ज्याचा आकार जवळजवळ चौरस आहे, तो पवित्र आहे आणि बालिनी धर्मात त्याला विशेष स्थान आहे. संपूर्ण बेटावरील सर्वात महत्वाचे मंदिरांपैकी एक येथे आहे.

बालिनी मंदिरांचे प्रकार
सर्व मंदिरांचे खालीलप्रमाणे वर्गीकरण करता येईल.
- डोंगर उतारावर किंवा ज्वालामुखींवर उभारलेले, या प्रकारचे उदाहरण म्हणजे बेसाकीह मंदिर परिसर, ज्याचा उल्लेख ज्वालामुखीबद्दलच्या लेखात केला गेला आहे.
- सुंदर शाही मंदिरे (पुरा तमन अयुन)
- समुद्रकिनारी असलेली मंदिरे या प्रकारातील आहेत.
- विशिष्ट व्यवसायांचे संरक्षण करणारी वैयक्तिक देवतांची अभयारण्ये: मच्छीमार, भात पिकवणारे शेतकरी. तांदूळ आणि प्रजननक्षमतेची देवी, देवी श्री, बाली लोकांमध्ये खूप पूजनीय आहे. तिच्या अगणित वेद्या भाताच्या शेतात विखुरलेल्या आहेत.
- पाण्याची मंदिरे, ज्यांचे पुजारी देखील पाण्याच्या वितरणासाठी जबाबदार आहेत. यामध्ये उलुन दानू ब्राटन मंदिराचा समावेश आहे, जे आम्हाला पहायचे आहे.
तांदूळ, पाण्याचा पंथ आणि नद्या आणि तलावांच्या बालिनी देवीबद्दल
बरं, भाताबरोबर सर्व काही स्पष्ट आहे, हे बेटावरील मुख्य अन्न पीक आहे आणि बाली आहाराचा आधार आहे.
येथे, उदाहरणार्थ, नासी गोरेंग, बालीमध्ये लोकप्रिय आणि प्रिय, वाफवलेला तांदूळ आहे, नंतर भाज्या, अंडी किंवा मांसाचे तुकडे घालून तेलात तळलेले आहे आणि नासी उलम हा उकडलेला तांदूळ आहे, तसेच भाज्या मसालेदार मसाल्यासह. तांदूळ, पुन्हा भात हा डिशचा मुख्य घटक आहे. इथे आपल्या भाकरीपेक्षा जास्त महत्त्व आहे.
कापणी केवळ शेतात आणि डोंगराच्या उतारावर असलेल्या टेरेसमध्ये कठोर शारीरिक श्रमानेच पुरवली जात नाही तर भाताला भरपूर आर्द्रता आवश्यक आहे.
आश्चर्याची गोष्ट म्हणजे, बालीमधील जवळपास सर्वच शेती सिंचनावर आहे. असे दिसते की उष्णकटिबंधीय मुसळधार पावसामुळे बेटावर इतके मोठे पाणी वाहून जाते की ते जास्त प्रमाणात असावे! परंतु या ठिकाणांचा जळणारा सूर्य त्वरीत त्याचे वाफेत रूपांतर करतो आणि पृथ्वी सतत कोरडी करतो. आणि अल्पाइन तलाव सिंचनासाठी आर्द्रतेने बाग आणि वृक्षारोपण उदारपणे संतृप्त करते.
म्हणूनच, मंदिरांमधील धार्मिक समारंभांमध्ये, ब्राह्मण त्यांच्या कळपांना बाली तलाव आणि तांदूळ यांचे पवित्र पाणी देऊन आशीर्वाद देतात हे आश्चर्यकारक नाही. आणि विश्वासणारे, यामधून, भेटवस्तू आणतात आणि पाण्याची देवता देवी उलुन दानू यांना प्रजननासाठी प्रार्थना करतात.

उलुन दानूची मंदिरे आणि ब्रॅटन तलावावरील मंदिर
देवी बटारी उलुन दानू ही बालीमधील सर्व नद्या आणि तलावांची देवी आणि संरक्षक असल्याने, तिच्या पूजेसाठी एकच मंदिर असेल तर ते विचित्र होईल. होय, त्यापैकी चार आहेत. परंतु, सर्वात महत्वाचे, म्हणून बोलायचे तर, तिचे प्रतिनिधी आणि सर्वात प्रसिद्ध निवासस्थान बतूर तलावाच्या ईशान्येस स्थित आहे.
पण ब्रॅटन सरोवराच्या किनाऱ्यावर उलुन दानूचे जलमंदिर - पुरा उलुन दानू ब्राटन - हे बालीमधील मंदिर वास्तुकलेचे सर्वात भव्य उदाहरण आहे.
हे बेटाचे खरे रत्न आहे आणि अनेकांसाठी त्याचे दैवी सौंदर्य, तलावाच्या स्वच्छ पाण्यात प्रतिबिंबित झाल्यामुळे दुप्पट झाले आहे, बालीशी संबंधित आहे. इंडोनेशियन पन्नास-हजारव्या नोटेवर त्याच्या बारीक आणि सुसंवादी पॅगोडाची प्रतिमा आहे यात आश्चर्य नाही.

बालिनी मंदिर वास्तुकला
मशिदी आणि ख्रिश्चन मंदिरे दोन्ही भव्य आहेत. इमारती, बाहेरून भव्य आणि आत उदात्त विस्मय ... लक्षात ठेवा - देवाची बुद्धी, जे इस्तंबूलमध्ये स्थित आहे, किंवा इस्तंबूलमध्ये त्याच ठिकाणी स्थित आहे, किंवा कॅथेड्रल आणि मंदिरे आणि.
बालीमधील देवतांचे निवासस्थान ही पूर्णपणे वेगळी बाब आहे.
बालीनीज शब्द "पुरा", ज्याचा अर्थ सार्वजनिक मंदिर, "भिंतीने वेढलेली जागा" असा होतो.
आणि भिंतींच्या बाहेर मंदिराचे प्रांगण असून आतमध्ये विविध रचना आहेत.
नियमानुसार, असे तीन अंगण आहेत, कारण हिंदू मानतात की विश्व तीन भागांमध्ये विभागले गेले आहे - देवांसाठी, राक्षसांसाठी आणि लोकांसाठी. अंगण एकामागून एक येत आहेत आणि चांगल्या आणि वाईटाच्या बालीनी अक्षावर केंद्रित आहेत, जे उत्तरेकडून - पर्वतांपासून, दक्षिणेकडे - समुद्राकडे निर्देशित केले जाते.
- मंदिराचे प्रवेशद्वार दक्षिणेला आहे आणि एका गेटमधून दोन भागांतून पहिल्या प्रांगणात जाते.
- त्यातून तुम्ही लाकडी दारे असलेल्या गेटमधून मध्यभागी अंगणात जाऊ शकता, जिथे सर्व प्रकारच्या सहाय्यक संरचना आहेत - स्टोअरहाऊस, कोठारे, यज्ञ तयार करण्यासाठी जागा, खुले मंडप, कोंबड्यांच्या झुंजीसाठी प्लॅटफॉर्म.
- इथून गेटमधून मंदिराच्या तिसऱ्या, सर्वात पवित्र भागाकडे जातो. येथे दैवी सेवा केल्या जातात, सर्व वेद्या आणि वेद्या येथे आहेत आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे - पद्मासन - शिवाचे सिंहासन. येथे वेगळ्या प्रकारचे शिशाचे दरवाजे आहेत, त्यांना पायऱ्या आहेत आणि सतत सजावटीच्या कोरीव काम असलेल्या पिरॅमिडल टॉवर्सने सुशोभित केलेले आहे. ते भयानक राक्षसांच्या आकृत्यांनी संरक्षित आहेत. तथापि, लोक त्यांच्यामधून जात नाहीत - हा देवांचा रस्ता आहे, पृथ्वीवरील अभ्यागत भिंतीच्या बाजूच्या उघड्यांमधून जातात.
पहिले दोन अंगण पर्यटकांसाठी उपलब्ध आहेत, परंतु तिसरे नाही.

मंदिराच्या प्रदेशावर, साखरेच्या तळहाताच्या तंतूंनी बनवलेल्या काळ्या छतासह उंची - मोजमाप करण्यासाठी टायर्ड टॉवर्सकडे लक्ष वेधले जाते. ख्रिसमसच्या झाडांप्रमाणे, ते देव जेथे उतरतात आणि धार्मिक समारंभांदरम्यान ते जेथे राहतात त्या ठिकाणाचे प्रतिनिधित्व करतात. स्तरांची संख्या केवळ विषम असू शकते आणि अकरापेक्षा जास्त असू शकत नाही. देवतेचा दर्जा जितका तितका अधिक स्तर.

बाहेर, बालीनीज मंदिर उल्लेखनीयपणे चांगले आहे - दरवाजे, भिंतीवरील कॉर्निसेस, नाले, वेद्या - सर्व काही आश्चर्यकारक दागिन्यांनी सजवलेले आहे, पक्षी, प्राणी, भयानक नखे असलेले राक्षस आणि दात असलेले ड्रॅगन यांच्या शिल्पकला प्रतिमा. आतून जवळजवळ रिकामा आहे.
काय लक्षात ठेवावे
परदेशी पाहुण्यांनी हे लक्षात ठेवले पाहिजे की शॉर्ट्स आणि टी-शर्ट भेट देण्यास योग्य नाहीत, पुरुषांसाठी शरीराच्या खालच्या भागात लांब पायघोळ किंवा सारँग, महिलांसाठी जीन्स, लांब स्कर्ट किंवा सारँग परिधान करणे आवश्यक आहे. मंदिराला भेट देताना मुख्य गोष्ट म्हणजे सारॉन्गची उपस्थिती नसून बुलंग बेल्टसारख्या पोशाखाचा आवश्यक तपशील, जो नक्कीच सारॉन्गला जोडलेला आहे.
तसे, सारॉन्ग हा फक्त आयताकृती फॅब्रिकचा तुकडा नसतो, परंतु हा तुकडा त्याच्या लहान बाजूने शिवलेला असणे आवश्यक आहे, जसे.
स्त्रियांना पारंपारिक लांब स्कार्फ कंबेन चेरिक असणे इष्ट आहे. इतक्या जुन्या काळात, जेव्हा बालीनी, लाज न बाळगता, बेटाभोवती उघड्या छातीने फिरत, तेव्हा त्यांनी पवित्र स्थानाच्या प्रवेशद्वारासमोर या स्कार्फने त्यांचे आकर्षण झाकले. आता हा स्कार्फ बालिनी राष्ट्रीय महिलांच्या पोशाखाचा फक्त एक बहु-कार्यात्मक तपशील आहे.
- तुम्ही बसलेले किंवा उभे असताना लक्ष द्या जेणेकरून तुमचे डोके सेवा करणार्या पुजार्याच्या डोक्यापेक्षा उंच नसावे.
- जर उपासक प्रार्थना करत असतील तर त्यांच्या समोरून चालू नका, पुजारीसमोर उभे राहू नका, फोटो काढताना फ्लॅश वापरू नका.
- आडवा पाय कधीही बसू नका. जेव्हा या स्थितीत असलेला पाय त्यांच्याकडे बोट दाखवत असल्याचे दिसते तेव्हा बालिनी लोकांना ते विशेषतः आक्षेपार्ह वाटते.
- तुम्ही बरे न झालेल्या जखमा, ताज्या जखमा आणि गंभीर दिवसांमध्ये स्त्रियांसह पवित्र ठिकाणी येऊ शकत नाही
- तुम्ही इथे तुमचे शूज काढू शकत नाही.

बाली सर्वोत्तम ठिकाणे - पवित्र आणि नयनरम्य मंदिर पुरा उलुन दानु ब्राटन
आम्ही झपाट्याने ब्रॅटन तलावावर पोहोचलो - अवघ्या दोन तासात. उद्या, सूर्याच्या पहाटेच्या किरणांमध्ये, आम्ही पुरा उलुन दानू ब्रतनच्या मंदिराचे चित्रीकरण करू. आपण सर्वजण या आख्यायिकेच्या प्रभावाखाली आहोत की सरोवर देवी निवडलेल्याला तारुण्य आणि दीर्घायुष्य देऊ शकते, परंतु तिच्या डोमेनच्या पाण्यात पहाटे भेटणाऱ्याला.
आम्ही पटकन आमच्या खोल्यांमध्ये स्थायिक झालो आणि झोपायला गेलो. भिंती सर्व ध्वनी चालवतात, असे दिसते की त्या प्लायवुडपासून बनवल्या गेल्या नसून पुठ्ठ्यापासून बनवल्या गेल्या आहेत. बेड लिनन ओलसर आहे. थंडी जाणवते.
पहाटे पाच वाजता आम्ही आमच्या छिद्रातून बाहेर पडतो, झोपलेले आणि गोठलेले. इतका उशीर का, तुम्ही विचारता? होय, कारण हॉटेलच्या भिंतींच्या बाहेर ब्रॅटन सरोवर पसरले आहे आणि पुरा उलुन दानूचे मंदिर दगडफेक दूर आहे.
सर्वकाही असूनही, आपले आत्मे उत्साही आहेत. अशा प्रकारे जीवन देणारी नैसर्गिक शक्ती असलेली ठिकाणे चिन्हांकित केली जातात. त्यांच्यामध्ये राहणे सोपे आणि आनंददायक आहे, तुमच्यावर त्यांची उर्जा आहे आणि म्हणून तुम्हाला खूप छान वाटते.
आम्ही प्रवेशद्वार मधून जातो, पोर्टल प्रमाणेच दुसर्या परिमाणात.
जरी उलुन दानू मंदिर तीनशे वर्षांहून अधिक जुने असले तरी, ते विलक्षणरित्या संरक्षित आहे आणि विलक्षण प्रभावशाली दिसते - बहु-स्तरीय पॅगोडा तलावाच्या निळ्या पृष्ठभागावर धुक्यातून गूढपणे वाढतात. आजूबाजूला हिरवीगार जंगले आणि त्यांच्या वरती - ढगांमध्ये हरवलेले भव्य पर्वत. आणि सर्वात वर हे शाश्वत आकाश आहे, जसे की तलावाचे प्रतिबिंब.

जरी आम्हाला दुसरे काही दिसले नाही, तरीही मी ट्रिप यशस्वी मानेन.
उलुन-दानू ब्रतनचे मंदिर पाण्यात उभे आहे हे त्याचे मुख्य वैशिष्ट्य आहे. एका बेटावर उभा असलेला 11-स्तरीय पॅगोडा हे विशेष मंदिर आहे. मंदिर परिसराचा परिसर सुसज्ज आणि मोहक आहे, तेथे बरीच फुले आहेत.
डोंगराच्या उतारावर एक बौद्ध स्तूप आणि दूर नाही - एक मशीद देखील आहे. परंतु पर्यटक भागाच्या बाहेर, कॅटामॅरन्सच्या पायथ्यापेक्षा थोडे पुढे, सर्व काही आधीच कमी आकर्षक आणि स्वच्छ आहे.

ते काय आहेत, बालिनीज?
सान्या आणि डॉ. व्ही बेटाच्या एका छोट्याशा काठावर पहाट पहात आहेत. ते अस्वस्थ आणि गर्दीचे आहेत, परंतु हे योग्य ठिकाण आहे आणि ते सहन करतात.
पण तरीही बालीमधील एक आश्चर्यकारक ठिकाण! येथे एक माणूस त्याच्या व्यवसायात जात आहे. तो त्यांना तयार बसलेले पाहतो, मोठ्याने हसतो आणि विचारतो की मंदिराला प्रकाश देणारे कंदील त्यांना फोटो काढण्यापासून रोखतात का. अर्थात ते हस्तक्षेप करतात! आणि मग ती व्यक्ती मागे वळते आणि सर्वकाही ठीक करण्यासाठी घाई करते. एका मिनिटात, हस्तक्षेप करणारी सर्व काही विझते आणि व्यक्ती त्याच्या मार्गावर चालू ठेवते. आम्ही स्तब्धपणे आभार मानतो, परतीच्या स्मितात मोडतो आणि फोटो काढू लागतो.
मैत्री, मैत्री, प्रतिष्ठा - हे बालिनीज आहेत. आणि ते बाली एक आश्चर्यकारक ठिकाण आहे - हे निश्चित आहे: कारण बेटावर त्यांना माहित नाही - त्यांना माहित नाही, त्यांना माहित आहे - त्यांना दारू किंवा दरोडे देखील माहित नाहीत.

ब्रॅटन तलावावरील मंदिरातील सूर्य आणि फुले
सूर्य उगवला आहे आणि गरम होत आहे. आमचे थाई कॅमेर्यावर क्लिक करण्याचे काम करतात. एक आदरणीय महिला निओनॅटोलॉजिस्ट क्लिक करते, तिच्याकडे कॅमेरा आहे, जसे माझ्याकडे आहे - फक्त दिवसाच्या प्रकाशासाठी, राजकुमारी तिच्या छोट्या कॅमेर्यावर काहीतरी क्लिक करते, एक मुलगी-मुलगी उदासीनपणे फोनकडे टक लावून बसते, तिच्यासाठी सर्वकाही जांभळे आहे. दरम्यान, सूर्य, काठोकाठ, मंदिर, त्यातील पुतळे, प्रवेशद्वारावर गोठलेल्या बेडकांच्या आकृत्या प्रकाशित करतो. सरोवर मंदिर आकाश आणि आकाशात तरंगते आणि त्याभोवती कमळ फुलले आहेत.
सूर्य उगवल्यावर लोक येऊ लागले आणि काही वेळातच लोकांचा प्रवाह उफाळून येऊ लागला. आज बौद्ध सुट्टी आहे, बलिदानाचा एक पवित्र दिवस आहे. तसे, बर्याच बौद्ध देशांमध्ये ही एक अधिकृत सुट्टी आहे, आमच्या थाईंनी त्याच्यासाठी ही सहल तयार केली आणि त्यास वेळेच्या सुट्टीत पूरक ठरले.
या दिवशी, योग्य बौद्धांनी एकतर एखाद्याला अन्नदान करावे किंवा देवतेला बलिदान करावे असे मानले जाते. दुसरा मार्ग सोपा आहे, म्हणून बहुतेक त्याग करणे निवडतात.
आपण लोकांमध्ये फिरतो, फोटो काढतो. उलुन दानू ब्राटन मंदिराचा प्रदेश हा लँडस्केप डिझाइनचे एक वास्तविक कार्य आहे, एक बाग जिथे सुंदर उष्णकटिबंधीय फुले उगवतात - निखळ वैभव आणि लक्झरी. परिचितांपैकी - पिवळ्या, खाली लोंबणार्या सुंदर फुलांचे झाड आणि जांभळा, वाघ lilies च्या छटा दाखवा मध्ये irises.
मग ढोल-ताशांच्या गजरात एक मिरवणूक निघाली, मंदिराच्या परिसरातून निघाली आणि माझ्या सन्याला त्याच्या कॅमेरासह ओढून नेली...

आम्ही बालीमधील सर्वोत्तम ठिकाणांपैकी एक असलेल्या ब्राटन तलावावरील उलुन दानु मंदिर सोडतो. आमच्या पुढे डोंगराच्या सापाच्या बाजूने आणखी चार तास आहेत, जावाकडे जाणारी फेरी, त्यानंतर इजेन ज्वालामुखीकडे जाणारा आणखी काही तासांचा रस्ता, विवराच्या काळ्या पाताळात निळ्या आगीच्या लखलखाटासाठी, विवराच्या विलक्षण सौंदर्याकडे. पिवळ्या सल्फरच्या हताश खाण कामगारांना, त्याच्या विषारी धुरांसह अम्लीय तलाव.
आरएसएस, ईमेल- पत्ता:बटुरिती ताबानान, बाली, इंडोनेशिया
- उघडण्याची वेळ:तलावावरील पुरा उलुन दानू ब्राटनच्या मंदिराकडे जाणारा रस्ता 8:30 ते 18:00 पर्यंत खुला असतो
- भेटीची किंमत:तलाव - विनामूल्य, मंदिराचे प्रवेशद्वार पुरा उलुन दानू ब्राटन - 30 हजार रुपये ($ 2.25)
ब्रॅटन सरोवर (इंडोनेशियामध्ये - बेराटन) हे तीन पवित्र तलावांपैकी सर्वात प्रसिद्ध आणि पर्यटकांनी सर्वाधिक भेट दिलेले आहे (आणि सोबत). येथे एक आश्चर्यकारक वातावरण राज्य करते, हिरवीगार उष्णकटिबंधीय जंगले बहुतेकदा धुक्याने आच्छादलेली असतात आणि सभोवतालचे भव्य पॅनोरमा डोंगरातून उघडतात.
स्थान
ब्रॅटन तलाव बाली बेटावर, तापकच्या पायथ्याशी, समुद्रसपाटीपासून सुमारे 1200 मीटर उंचीवर आहे.
ब्रोचा इतिहास
अनेक सहस्राब्दींपूर्वी, या भागांमध्ये प्रचंड चतुरचा एक शक्तिशाली आणि विनाशकारी स्फोट झाला, ज्यामुळे कॅल्डेरा तयार झाला, जो अनेक शिखरांसह अनेक ज्वालामुखी आहे. स्फोटाच्या परिणामी, आजूबाजूच्या भागात मोठे बदल झाले आहेत, त्यापैकी एक म्हणजे बालीच्या या भागात 3 पवित्र जलाशयांची निर्मिती. त्यापैकी लेक ब्रॅटन होते.
तलाव आणि बेटावरील त्याच्या भूमिकेबद्दल आख्यायिका
ब्रो, बुयान आणि तांबलिंगन हे ताजे पाण्याचे स्त्रोत आहेत, सर्व बाजूंनी खारट समुद्राच्या पाण्याने वेढलेले आहेत. म्हणून, बाली लोक त्यांच्याशी अत्यंत आदराने वागतात. खरंच, या गोड्या पाण्याच्या स्रोतांमुळे, स्थानिक रहिवासी सिंचन करू शकतात, ज्यापासून कापणी थेट जलाशयांच्या पूर्णतेवर अवलंबून असते.
बालिनी लोक अनेक दंतकथा ब्रॅटन सरोवराशी जोडतात. त्याचे नाव स्थानिक भाषेतून लेक ऑफ द होली माउंटन असे भाषांतरित केले आहे. प्राचीन विश्वासांनुसार, प्रत्येक व्यक्ती जो सूर्याच्या पहिल्या किरणांमध्ये त्यात स्नान करतो त्याला तारुण्य आणि आरोग्य मिळेल, दीर्घ आणि आनंदी आयुष्य जगेल. ब्रॅटन तलाव बराच मोठा आहे, परंतु फार खोल नाही (त्याची कमाल खोली सुमारे 35 मीटर आहे). त्यातील पाणी सर्वात शुद्ध आहे, म्हणून येथे डुबकी मारणे आनंददायक आहे.
भावाला "देवी दानुचे निवासस्थान" असेही म्हणतात. येथे असे मानले जाते की या बेटावर देवीची 4 निवासस्थाने आहेत, ज्यात प्रत्येक पवित्र तलावाचा समावेश आहे. आणि बालीमधील ब्रॅटन सरोवराच्या किनाऱ्यावर, त्यांनी तिच्यासाठी एक वेगळे बांधले.
तलाव आणि त्याच्या परिसराचे आकर्षण
तुम्ही लेक ब्रॅटनला भेट देण्याचे ठरविल्यास तुम्ही कशाकडे लक्ष द्यावे ते येथे आहे:


तिथे कसे पोहचायचे?
बालीमधील लेक ब्रॅटनला जाण्यासाठी, तुम्ही सार्वजनिक सेवा वापरू शकता किंवा स्वतःहून जाऊ शकता.
सार्वजनिक वाहतूक (बस आणि मिनीबस) बेटाच्या मुख्य रिसॉर्ट शहरांच्या टर्मिनलमधून निघते:
- पासून,- तुम्हाला टर्मिनलवर जाणे आवश्यक आहे, नंतर बसमध्ये बाजूला जाणे आवश्यक आहे; ते 10:00 वाजता निघते, तिकिटाची किंमत 75 हजार रुपये ($5.6);
- टर्मिनल पासून ते- बसेस 10:30 वाजता सुटतात, तुम्हाला तिकिटासाठी देखील तेवढीच रक्कम भरावी लागेल;
- टर्मिनल पासून ते- मार्ग 11:30 वाजता सुरू होतो, तिकीटाची किंमत वरील मार्गांप्रमाणेच आहे.
ब्रॅटन तलाव परिसरात रस्ता धोकादायक आहे का, या प्रश्नात कारने प्रवास करणाऱ्यांना अनेकदा रस असतो. नाही, रस्ता अगदी शांत आहे, परंतु मार्ग आधीच जाणून घेणे अर्थपूर्ण आहे, ज्यामुळे वेळ वाचेल आणि गमावले जाणार नाही.
बालीच्या मुख्य शहरांमधून लेक ब्रॅटनला जाण्यासाठी तुम्हाला 2 ते 2.5 तास लागतील.
खाली आम्ही काही वस्त्यांमधून कारने तेथे कसे जायचे याचे थोडक्यात वर्णन आपल्या लक्षात आणून देतो:
- डेनपसार, सेमिन्याक, लेगियन, कुटा आणि सनूर येथून.आपल्याला उत्तरेकडे Jl कडे जायचे आहे. देनपसर-सिंगराजा, आणि त्यावर एकदा, तुम्हाला आणखी 27 किमी अंतरावर जावे लागेल. त्यावर तुम्ही Jl वर डावीकडे वळू शकता. बटूरीती बेदुगुल (या प्रकरणात, तुम्हाला तानाह लॉट मंदिर देखील दिसेल, हिरव्या चिन्हांचे अनुसरण करा उलुन दानु बेराटन), किंवा उजवीकडे, Jl. Puncak Mangu (मग तुम्ही निरीक्षण डेकसह तलावाच्या दक्षिणेकडील समुद्रकिनाऱ्यावर जाल आणि तेथून एक भव्य पॅनोरामा मिळेल).
- बुकिट द्वीपकल्प आणि उबुद पासून.मार्ग मागील मार्गांसारखेच आहेत, फक्त प्रथम तुम्हाला डेनपसरला जावे लागेल. Ubud वरून तुम्हाला दक्षिणेकडे Jl ला जावे लागेल. राया सिंगकर्ता, आणि नंतर Jl वर जा. देणपसर-सिंगराजा.
बतुर - आम्ही सक्रिय ज्वालामुखी, बाली, इंडोनेशियावर कसे चढलो. बालीमधील सुट्ट्या - मुलासह बालीभोवती फिरणे - दिवस बतुर ज्वालामुखीवर चढणे स्व-सहाय्याने बतुरला चढणे
प्रत्येक
वेळी जेव्हा कोणी मला विचारते की बालीमध्ये दोन महिने राहणे कंटाळवाणे
आहे, तेव्हा मी फक्त माझे खांदे सरकवतो. जर बाली हे एक सामान्य बेट असते,
ज्यामध्ये स्वर्गीय समुद्रकिनारे, परिपूर्ण पाण्याचे रंग आणि खजुरीची झाडे
हे सर्व वैभव निर्माण करतात, तर ती कदाचित एका आठवड्यात कंटाळवाणेपणाने मरण
पावली असती.
पण हे बेट इतके वैविध्यपूर्ण असताना कंटाळवाणे कसे होईल. मी यापुढे उबुदची स्तुती करणार नाही, तुम्हाला आधीच सर्व काही माहित आहे :))
परंतु जेव्हा तुम्ही येथे राहता तेव्हा बेटाच्या मध्यभागी, बाईकवर फक्त दीड ते दोन तास तुम्हाला समुद्रापासून वेगळे करतात, ज्वालामुखीची काळी वाळू आणि प्रचंड, किलोमीटर लांबीचे समुद्रकिनारे किंवा त्याउलट, बर्फाच्छादित, लहान खाडी मध्ये sandwiched.
किंवा उत्तरेकडील ज्वालामुखी पासून, पर्वत तलाव आणि त्यांच्या किनाऱ्यावरील थर्मल झरे.
यावेळी माझे हृदय तिथेच आहे.

तुम्हाला
माहिती आहेच की इंडोनेशियामध्ये ज्वालामुखी खूप आहेत. येथून पृथ्वीचे
अग्निमय वलय जाते. बाली अर्थातच त्याला अपवाद नाही. आमच्याकडे येथे पवित्र
माउंट अगुंग (एकत्रित सक्रिय ज्वालामुखी) आहे, ज्यावर सर्व स्थानिक लोकांची
मूर्ती आहे, ज्यावर देवता राहतात आणि जे ढग साफ झाल्यावर भव्यपणे दिसणारे,
कोणत्याही लँडस्केपमध्ये नाटक जोडतात. आणि पर्वत लहान नसल्यामुळे, 3142
मीटर, आणि बेटावर गगनचुंबी इमारती नाहीत, आपण ते खूप वेळा पाहू शकता.
नवीन वर्ष-2016 आपण बालीमध्ये पुन्हा भेटू! आम्ही तुम्हाला आमच्या बॅचलोरेट पार्टीमध्ये पाहण्यास उत्सुक आहोत!
अनेक पर्यटकांना साहसी आणि सुंदर ठिकाणे आकर्षित करतात. बतूर ज्वालामुखी तुम्हाला बालीच्या सभोवतालची आश्चर्यकारक दृश्ये, भरपूर सकारात्मक भावना आणि उत्कृष्ट फोटो देऊ शकतात. जर तुमच्यात शक्ती आणि उर्जा असेल आणि तुम्हाला डोंगरावर लांब चढण्याची भीती वाटत नसेल, तर बतुर ज्वालामुखीच्या शिखरावर जाण्याची खात्री करा. याक्षणी, हे एक लोकप्रिय सहल आहे आणि अनुभवी मार्गदर्शक शोधणे कठीण नाही. जरी असे बरेच धाडसी आहेत जे स्वतःहून बतुरवर चढतात.
बतुर ज्वालामुखी हा बालीमधील अगुंग नंतरचा दुसरा सर्वात मोठा ज्वालामुखी आहे आणि त्याची खालील वैशिष्ट्ये आहेत:
- उंची: 1717 मी.
- स्थान: बेटाच्या ईशान्येस.
- पहिला स्फोट: 500,000 वर्षांपूर्वी.
- शेवटचा स्फोट: 1964
- क्रियाकलाप: सतत हादरे. क्रॅटर्सवर क्रॅक तयार होतात, ज्यामधून गॅस बाहेर पडतो (दृश्यदृष्ट्या वाफेसारखे दिसते).
- गिर्यारोहण कालावधी: 2 तास.
- शेवटचा रेकॉर्ड केलेला क्रियाकलाप: 2011 मध्ये. सल्फर डायऑक्साइड सोडण्यात आले, ज्यामुळे तलावातील रहिवाशांचा मृत्यू झाला.
कसे उठायचे?
3 मुख्य मार्ग आहेत:
- स्वतःहून. तुम्हाला अचूक मार्ग माहित असणे आवश्यक आहे, पायी या आणि चढायला सुरुवात करा.
- स्थानिक लोकांच्या मदतीने. बेटावर राहणार्या दयाळू लोकांबद्दलच्या सुंदर कथा विसरा. स्थानिक लोक, ज्यांनी ज्वालामुखीच्या पायथ्याशी कब्जा केला आहे, ते तुमच्याकडून फेरफटका मारण्यासाठी शक्य ते सर्व प्रयत्न करतील. बालीनी लोकांनी पर्यटकांना एस्कॉर्टशिवाय ज्वालामुखीकडे जाऊ दिले नाही अशी अनेक प्रकरणे आधीच घडली आहेत. त्यांना धमकावले, मोटारसायकलचे टायर फोडले, मुठी व काठ्यांनी हल्ला केला. त्यामुळे तुम्हाला प्रतिकार वाटत असल्यास, त्यांना पैसे द्या आणि त्यांच्याबरोबर जा. तुमची सुट्टी खराब करू नका.
- सहल गटासह. सर्वात सुरक्षित पर्याय. सहसा प्रेक्षणीय स्थळांचे दौरे तुलनेने स्वस्त असतात. तुम्हाला तुमच्या हॉटेलमधून उचलले जाईल, ज्वालामुखीकडे नेले जाईल आणि त्याच्या शिखरावर जाण्यासाठी मार्गदर्शक प्रदान केले जाईल. अन्न सहसा किंमतीमध्ये समाविष्ट केले जाते. आपण या साइटवर बतूर ज्वालामुखीचा दौरा ऑर्डर करू शकता.

स्वतःहून चढणे योग्य आहे का?
तुम्ही पार्किंगमध्ये न वळता मुख्य रस्त्याने गाडी चालवल्यास तुम्हाला स्वतःहून ज्वालामुखीवर चढण्याची संधी आहे. तुम्ही पुरा तांपुरह्यांग जवळ पार्क करू शकता - हे सर्वात सुरक्षित आहे. लक्षात ठेवा, कोणत्याही परिस्थितीत पर्यटन मार्गांवर जाऊ नका. या प्रकरणात, तुम्ही टूर विकणाऱ्या स्थानिकांना अडखळतील आणि तुम्हाला पैसे आणि मार्गदर्शकाशिवाय आत येऊ देणार नाहीत.
आणि आता मुख्य गोष्टीबद्दल - धोक्याबद्दल. अर्थात, कोणतीही चढण धोकादायक असते. ज्वालामुखी, पर्वत किंवा इतर कोणतेही क्षेत्र जेथे अचानक दबावात बदल होतात अशा लोकांसाठी आरोग्य समस्या आहेत ज्यांच्या रक्तवाहिन्या आणि हृदय कमकुवत आहे. तथापि, बालीमध्ये, आपल्याला केवळ यापासून घाबरण्याची गरज नाही. मी वर लिहिल्याप्रमाणे, मार्गदर्शकाशिवाय ज्वालामुखीवर चढण्याचा निर्णय घेणाऱ्या पर्यटकांसाठी धोका स्थानिकांच्या आक्रमकतेमध्ये आहे.
बाली लोक पैसे कमावण्यासाठी धडपडत आहेत. एक संपूर्ण टोळी (50 पेक्षा जास्त लोक) बेटावर काम करते, जी गर्दीत तुमच्यावर हल्ला करू शकते आणि तुम्हाला ज्वालामुखीवर चढण्यापासून रोखू शकते. ते स्त्रिया आणि मुलांची काळजी करणार नाहीत, ते प्रत्येकाला मुठी आणि काठीने मारू शकतात.
ज्वालामुखीजवळ राहणारे लोक मानतात की हा त्यांचा प्रदेश आहे आणि त्यावर कोण आणि कसे चालायचे हे ठरवण्याचा अधिकार त्यांनाच आहे. साहजिकच, ते तुम्हाला मार्गदर्शकासह आत येऊ देतील, परंतु क्वचितच एकटे. ज्वालामुखीजवळील समूहाला "HPPGB" म्हणतात.

आपण अद्याप संधी घेण्याचे ठरवले आणि स्वतःहून चढणे सुरू केले, तर मी तुम्हाला कमी हलका करण्याचा सल्ला देतो आणि तुमच्या मार्गाची आगाऊ योजना करतो. ज्वालामुखीवर आधीच चढलेला आणि मार्ग माहित असलेल्या तुमच्या मित्राला सोबत घेऊन जा. कोणत्याही परिस्थितीत पर्यटन मार्गांवर प्रवास करू नका आणि स्थानिकांना उत्तर द्या की आपण मित्रांकडे जात आहात किंवा फक्त चालत आहात. जर तुम्हाला पर्वतारोहणाचा अनुभव कमी असेल, तर तुम्ही चांगले पैसे द्याल आणि ज्वालामुखीवर चढण्याची हमी द्या.

ज्वालामुखीकडे कसे जायचे?
बतूर ज्वालामुखी बालीच्या ईशान्येला स्थित आहे, तेथे फक्त भाड्याने घेतलेल्या कार, दुचाकी किंवा टॅक्सीद्वारे पोहोचता येते, कारण सार्वजनिक वाहतूक तेथे जात नाही. आपण स्वतःहून जाण्याचा निर्णय घेतल्यास, नेव्हिगेटर वापरा, अन्यथा आपण गमावू शकता.
ज्वालामुखीवर चढण्यासाठी अनेक पर्याय आहेत. मी तुम्हाला एका तुलनेने सुरक्षित मार्गाबद्दल सांगेन जिथे तुम्हाला गटातील स्थानिकांना भेटण्याची शक्यता नाही:
- कुठेही न वळता मुख्य रस्त्याने चालवा.
- फाट्यानंतर, सुमारे 4 किमी नंतर, जंगलात जाणारा एक छोटासा मार्ग असेल - त्यावर वळा. तुम्ही मंदिराकडे जाणार्या पॉइंटरमध्ये जाल.
- झोपडीपर्यंत 600-800 मीटरपर्यंत चिन्हाचे अनुसरण करा. तुम्ही तुमचे वाहन येथे सोडू शकता.
- तळाशी जा आणि चढायला सुरुवात करा.

पर्यटकांसाठी स्मरणपत्र
- लोकल नेहमीच बरोबर असते. जर त्यांच्यापैकी एकाने तुम्हाला मारहाण केली किंवा पैशाची मागणी केली तर तुम्ही काहीही सिद्ध करू शकणार नाही. ते कितीही बेकायदेशीर असले तरी, स्थानिक नेहमीच बरोबर असतो, जरी न्यायाच्या दृष्टिकोनातून असे नाही. समजा की कारची काच तुमच्यावर ठोठावण्यात आली आहे, तुम्ही शक्तीहीन व्हाल, कारण गुन्हेगाराला कोणीही शिक्षा करणार नाही आणि जर तुम्ही स्वतःच अशा गर्विष्ठ कृत्याचा निर्णय घेतला तर पुढील परिच्छेद पहा.
- कोणाशीही वाद घालू नका. स्थानिक लोक डोंगरासारखे एकमेकांसाठी उभे आहेत. जर तुमचा एका व्यक्तीशी वाद झाला असेल, तर 10 मिनिटांनंतर बालीनी लोकांचा एक गट तुमच्याभोवती काठ्या आणि दगडांसह उभा असेल तर आश्चर्यचकित होऊ नका. अचानक भांडण झाल्यास तुम्ही मोठ्या संकटात सापडू शकता.
- ज्वालामुखीजवळील स्थानिकांशी किमान संपर्क. ते तुम्हाला पैसे देण्यासाठी काहीही करतील. उदाहरणार्थ, ते त्यांची बाइक अशा प्रकारे ठेवतील की कार चालवणे आणि तिला स्पर्श न करणे शारीरिकदृष्ट्या अशक्य आहे. बाईक दुसरीकडे झुकल्यानंतर किंवा पडल्यानंतर, तुम्हाला पैसे द्यावे लागतील आणि जर तुम्ही फक्त पैसे देऊन उतरलात तर तुम्ही खूप भाग्यवान असाल. पर्यटक गटांना चिकटून राहण्याचा प्रयत्न करा, शक्यतो मोठ्या गटांना. त्यामुळे तुम्हाला किमान सुरक्षा आहे.

हे सर्व भयानक आहे का?
अर्थात, तेथे अनुकूल स्थानिक आहेत जे तुम्हाला दुखापत झाल्यास मदत करतील आणि तुम्हाला मार्ग दाखवतील, परंतु तुम्हाला कोणत्याही गोष्टीसाठी तयार असणे आवश्यक आहे. कालांतराने, परिस्थिती फक्त गरम होते आणि संघटित सहलीच्या गटाशिवाय ज्वालामुखीवर चढणे चांगले नाही.
नकाशावर ज्वालामुखी बतुर
या नकाशावर तुम्हाला ज्वालामुखीचे अचूक स्थान सापडेल.
लक्षात ठेवा की परदेशी देश म्हणजे परदेशी नियम. बाली हे केवळ सुंदर लँडस्केप असलेले एक स्वर्गीय ठिकाण नाही, त्यामुळे संपूर्ण प्रवासात मेमो आणि वरील सर्व माहिती वापरून काळजी घ्या. टूर ग्रुपसह बतूर पर्वतावर चढणे हा सर्वात सुरक्षित पर्याय आहे.
गुनुंग ज्वालामुखी बतूर हे बाली बेट आपल्याला देणारे सर्वात मनोरंजक ठिकाण आहे. उंची 1717 मी. हा ज्वालामुखीपैकी एक आहे, ज्याची क्रिया 1964 मध्ये दिसून आली आणि 2000 मध्ये राख उत्सर्जन झाले. आता तुम्ही ज्वालामुखीच्या काही ठिकाणी वाफेचे उत्सर्जन पाहू शकता.
पर्वताच्या शिखरावर, जेथे ज्वालामुखी स्थित आहे, आयोजित केले आहे. बतूरच्या माथ्यावरून आजूबाजूचे सुंदर विहंगम दृश्य खुलते. हा देखावा खरोखरच चित्तथरारक आहे.
पर्यटकांना मार्गदर्शन करणारी एक आवडती युक्ती म्हणजे ज्वालामुखीच्या तोंडात अंडी उकळण्याची संधी.
कसे चढायचे
ज्वालामुखीवर चढणे खालील प्रकारे केले जाऊ शकते:
- कोणत्याही ट्रॅव्हल एजन्सीमध्ये, समूहाचा भाग म्हणून सहलीसाठी टूर खरेदी करा. टूरची किंमत 35 डॉलर्स पासून असेल. या किंमतीसाठी, ते मार्गदर्शक सेवा आणि हलका नाश्ता देतात.
- स्वतःहून ज्वालामुखीकडे जा. हे करण्यासाठी, बसने ठिकाणी जाणे आणि मार्गदर्शक भाड्याने घेणे पुरेसे आहे. नियमानुसार, अशा गटांमध्ये 4 लोकांपर्यंत भरती केली जाते. गाईडने टूर आयोजित करण्यासाठी ५०० रुपये विचारले, पण तुम्ही सौदेबाजी करू शकता.
- नकाशावरील मार्गासह स्वत: ला परिचित करा, ज्वालामुखीच्या पायथ्यापर्यंत चालवा आणि मार्गदर्शकाशिवाय, ज्वालामुखीच्या पर्वताच्या शिखरावर जा. परंतु तरीही, परदेशात, प्रथमच भूप्रदेशाची वैशिष्ट्ये माहित नसल्यामुळे, ज्वालामुखीकडे जाण्याची शिफारस केलेली नाही.
सर्वात मनोरंजक गोष्ट म्हणजे रात्रीच्या वेळी शीर्षस्थानी जाणे. उंच डोंगरावरील ज्वालामुखीवर पहाट भेटणे मोहक आहे. होय, आणि रात्रीच्या थंडीत चढावर चालणे अधिक आनंददायी आहे. पण गाईडशिवाय रात्री हलू नये.
ज्वालामुखी बद्दल तथ्य
- असे मानले जाते की ज्वालामुखीची सक्रिय क्रिया सुमारे 500 हजार वर्षांपूर्वी सुरू झाली.
- खड्ड्यात पर्वतांमधील सर्वात मोठे तलाव. जरा कल्पना करा, त्याची रुंदी सुमारे तीन किलोमीटर आहे आणि लांबीच्या बाजूने ती आठपर्यंत पसरली आहे.
- ज्वालामुखीचा पाय देखील पर्यटकांना एक आकर्षणाने भेटतो - तेथे एक हॉट स्प्रिंग थर्मल स्प्रिंग आहे (चित्रात). वसंत ऋतू मध्ये पोहणे आपण तलाव प्रशंसा करू शकता.
- 60 च्या दशकातील सर्वात मोठ्या स्फोटाचे परिणाम म्हणजे बेटावरील अनेक वस्त्यांचा नाश झाला. जीर्णोद्धार खूप पैसा आणि मेहनत घेतली.जर आपल्याला 2000 ची क्रिया आठवली, तर ती केवळ 300 मीटर उंच राखेच्या उत्सर्जनापुरती मर्यादित होती.
- 2011 मध्ये, आणखी एक शोकांतिका घडली - ज्वालामुखीवर सल्फ्यूरिक ऍसिडचे प्रकाशन तीव्र झाले, ज्यामुळे रहिवाशांमध्ये भीती आणि आरोग्याच्या समस्या निर्माण झाल्या आणि तलावामध्ये माशांच्या मृत्यूची तथ्ये नोंदवली गेली.
- बालिनी त्यांच्या "चमत्कार" बद्दल चिंताग्रस्त आहेत. त्यांना वेळोवेळी होणारे अतिरेक किंवा उद्रेक होण्याच्या धोक्याची भीती वाटत नाही - ते शेतीची कामे अगदी पायावर करतात, कारण तेथील जमीन सुपीक आहे.
जर तुम्ही बतुर ज्वालामुखीवर चढायचे ठरवले तर मार्गदर्शक आणि अनुभवी प्रवाशांनी दिलेल्या टिप्स काळजीपूर्वक वाचा:
- क्लाइंबिंग शूज आरामदायक आणि साधे असावेत. आरामदायक मऊ स्नीकर्समध्ये चढणे खूप सोपे होईल.
- तुमची सहल सुरू करण्यापूर्वी तुमची कार किंवा मोटारसायकल दिवसा भरून टाका, कारण रात्री भरण्यासाठी जागा नसेल - गॅस स्टेशन बंद आहेत. तुम्हाला रस्त्याच्या कडेला गॅसोलीन डीलर्सना भेटण्याची शक्यता आहे, परंतु तुम्ही रात्री यावर अवलंबून राहू नये.
- आपल्याला उबदार कपड्यांची आवश्यकता असेल. रात्री थंडी असेल. डोंगरावर चढताना तुम्हाला थंडी जाणवत नसली तरीही, तुम्हाला एक छेद मिळेल, वरच्या बाजूला उबदार वारा नाही. पावसाची शक्यता नाकारली जात नाही, म्हणून पावसापासून झाकणारा आणि वाऱ्यापासून वाचवणारा रेनकोट पकडणे हा एक उत्तम पर्याय आहे.
- लाइट्सची काळजी घ्या. तो एकटा नसेल तर बरे. रात्री, गडद जंगलाच्या वाटेने चालणे खूप भीतीदायक आहे. कंदिलाने, आपण अधिक आनंदाने मार्गावर मात कराल.
- तुमच्या सहलीचे फोटो आणि व्हिडीओ अनेक वर्षांच्या स्मृती आहेत, त्यामुळे मनोरंजक क्षण कॅप्चर करायला विसरू नका.
- सोबत अन्न आणि पाणी घ्या. वाटेत, तुम्हाला प्यावेसे वाटेल, आणि शिखर जिंकल्यानंतर, तुम्ही निश्चितपणे भुकेच्या भावनांवर मात कराल.
- तुमच्याकडे कंपास किंवा नेव्हिगेटर असणे आवश्यक आहे. तुमची कार किंवा बाईक जिथे उभी राहील ते ठिकाण चिन्हांकित करण्यास विसरू नका.
बतुर हा बालीमधील सक्रिय ज्वालामुखी आहे, जो बेटाच्या ईशान्येला आहे. बतूर हे बेटावरील सर्वात मनोरंजक ठिकाणांपैकी एक आहे, कारण, प्रथम, ते फक्त एक पर्वत नाही तर ज्वालामुखी आहे आणि दुसरे म्हणजे, ते सक्रिय ज्वालामुखी आहे. ज्वालामुखीची उंची 1717 मीटर आहे, त्याचा शेवटचा उद्रेक 1964 मध्ये झाला होता आणि 2000 मध्ये सुमारे 300 मीटर उंचीपर्यंत शेवटचा राख उत्सर्जन झाला होता. बतूर हे पर्यटकांसाठी देखील खूप आकर्षक आहे कारण तुम्ही फक्त दोन तासांत त्यावर चढू शकता, आणि शेजारच्या अगुंग ज्वालामुखीसारखे नाही, ज्याला चढण्यासाठी 6-7 तास लागतात. अनेकांना स्वतःची चाचणी घ्यायची असते आणि ते स्वतःहून एवढ्या उंचीवर चढू शकतात का हे पाहायचे असते. खरं तर, ही सर्वात कठीण चढाई नाही, कारण ज्वालामुखी फार उंच नाही आणि तुम्हाला फक्त 3 किलोमीटर चालत जावे लागते. बहुतेकदा, ते ढगांच्या वरच्या पहाटेचे आश्चर्यकारक सौंदर्य पाहण्यासाठी रात्री बतुरला जातात. आम्ही स्वतःची चाचणी घेण्याचे देखील ठरवले, कारण आम्ही यापूर्वी कधीही एका पर्वतावर चढलो नाही, ज्वालामुखी सोडा, सक्रिय ज्वालामुखी 🙂
बतूर
ज्वालामुखीकडे जाण्याचे 2 मार्ग आहेत - स्वतः मोपेड किंवा कारने किंवा
सहलीच्या गटात. आम्ही स्वतः मोपेडवर प्रवास केला, आमच्या ब्लिस सर्फर
हॉटेलपासून कुटापर्यंतचा रस्ता आम्हाला सुमारे 4 तास लागला. ज्यांच्यासोबत
आम्ही बतुरला सूर्योदयाची योजना आखली होती त्यांना भेटण्यासाठी आम्ही
रात्री उबुड मार्गे गाडी चालवली. रस्ता अवघड नव्हता, पण मी प्रत्येकाला
आदल्या दिवशी चांगली झोप घेण्याचा सल्ला देतो, तुम्हाला रात्रभर झोप लागणार
नाही आणि तुम्हाला प्रथम बतूर ज्वालामुखीवर जाण्यासाठी, त्यावर
चढण्यासाठी, खाली जाण्यासाठी आणि आपल्या हॉटेलवर परत जाण्यासाठी शक्तीची
आवश्यकता असेल. किनारा विशेषत: परतीच्या वाटेवर, तुम्हाला खूप झोप येते.
बतूर ज्वालामुखीनंतर, संपूर्ण कंपनी बतूरपासून दूर असलेल्या धबधब्यावर
गेली. आणि आम्ही संपूर्ण दिवस आमच्या पायांवर घालवला, इतका की आम्ही कुटाला
परत जात असताना, मी मोपेडवर दोन वेळा झोपी गेलो 🙂
बतुर ज्वालामुखीवरील मार्गदर्शक
तुम्हाला वाटेल की तुम्ही ज्वालामुखीवर सहज पोहोचू शकता आणि स्वतःच त्यावर चढू शकता, कारण तुम्हाला फक्त वर जाताना पर्यटकांचा पाठलाग करणे आवश्यक आहे, असे दिसते की यात काहीही क्लिष्ट नाही, बरोबर? आणि येथे एक महत्त्वाचा मुद्दा उद्भवतो, ज्याची अलीकडेच बालीबद्दलच्या मंचांवर चर्चा केली गेली आहे - हे बतुर ज्वालामुखीच्या पायथ्याशी मार्गदर्शक आहेत. ते तुम्हाला शांतपणे जाऊ देणार नाहीत आणि ज्वालामुखीवर चढायला सुरुवात करणार नाहीत. ते तुम्ही मार्गदर्शकासाठी पैसे द्यावे अशी मागणी करतील आणि तुम्हाला खात्री पटवून देतील की तुम्हाला फक्त मार्गदर्शकाची गरज आहे! जर तुम्ही त्यांचे प्रस्ताव नाकारले तर ते तुम्हाला अधिक आग्रहाने सांगतील की मार्गदर्शकाशिवाय, तत्वतः, बतुर ज्वालामुखीच्या शिखरावर जाणे अशक्य आहे. ज्वालामुखीकडे जाण्याचा मार्ग स्वतःच विनामूल्य आहे या वस्तुस्थितीमुळे, आपण स्वत: ज्वालामुखीच्या मार्गावर जाऊ शकत असल्यास आपल्याला पैशासाठी मार्गदर्शकाची आवश्यकता का आहे हे आपल्याला आश्चर्य वाटेल. पुढे, आधीच धमक्या येऊ शकतात, ज्यामध्ये तुम्ही तुमचे वाहन सोडले आहे, ज्यामध्ये तुम्ही पार्किंगच्या ठिकाणी आला आहात आणि ते असुरक्षित असेल, ते तुमच्या चाकांना आणि त्यासारखे सामान पंक्चर करू शकतात. अशी प्रकरणे आहेत जेव्हा तथाकथित मार्गदर्शक पर्यटकांना त्यांच्या सेवांसाठी सहमत नसताना त्यांना मारहाण करतात. जर, सर्व धमक्यांनंतर, आपण ठरवले की आपण 4 लोकांसाठी मार्गदर्शकासाठी 350,000 रुपये देण्यास तयार आहात, तर त्या क्षणी ते आपल्याला पूर्णपणे भिन्न किंमत - 4.5 पट किंवा त्याहून अधिक सांगू शकतील या वस्तुस्थितीसाठी तयार रहा. येथे तुम्हाला एकतर या किमतीला सहमती द्यावी लागेल किंवा बतूर पर्वताची चढाई रद्द करावी लागेल. आमची स्थानिकांशी चकमक झाली, परंतु मी खाली याबद्दल अधिक तपशीलवार लिहीन.
आमची बतूर पर्वत चढण्याची कहाणी
ज्युलियाला
नजीकच्या भविष्यात आमची चांगली मैत्रीण डायनाला इंटरनेट फोरमवर बतुरच्या
चढाईत सामील होण्याचे आमंत्रण मिळाले. आणि ही एक अतिशय मोहक ऑफर होती, कारण
हा ज्वालामुखी पहिल्या स्थानावर सक्रिय आहे आणि दुसर्या स्थानावर
असलेल्या आइसलँडिक आयजाफजालजोकुल पेक्षा उच्चार करणे खूप सोपे आहे.
आम्ही
सकाळी एक वाजता ओलेग आणि डायनाला उबुडमध्ये भेटण्याचे मान्य केले.
उबुडमध्ये, आम्ही ओलेग आणि डायना भेटलो, जे (माकड जंगल) पासून फार दूर
नसलेल्या एका अद्भुत ठिकाणी राहत होते, लवकरच नुसा दुआ येथील वर्या आणि
सेरेझा, सनूरमधील कात्या आणि कुटा येथील नास्त्या आमच्यात सामील झाले.
आम्हाला सरयोगाची वाट पहावी लागली, ज्याने आम्हाला एका छोट्या रस्त्याने
न्यायला होकार दिला, कारण दिवसभरात दोन वेळा तो जीपने बतुरला गेला होता.
लवकरच आमचा नवीन कॉम्रेड आला आणि आम्ही नऊ जण ईशान्येकडे धावले.

तसे,
विंडब्रेकर किंवा उबदार स्वेटर खूप उपयुक्त आहेत, रात्रीच्या वेळी ते
पर्वतांमध्ये खूप थंड असते आणि बाइकवर ते खूप लक्षणीय असते.
जवळजवळ
सर्व बाईक अर्ध्याच भरल्या होत्या, त्यामुळे त्या रात्री झोपलेल्या
बालिनीजपैकी एकामध्ये पहाटे ३ वाजता बाटलीबंद पेट्रोल सापडले. सेरेगाने
आम्हाला सर्व पर्यटक ज्या प्रमाणित मार्गाने जातात त्या मार्गाने न
जाण्याची ऑफर दिली, परंतु ज्वालामुखीच्या पलीकडे त्यांना बायपास करून.
तार्यांच्या
मार्गदर्शनाखाली असलेल्या सेरेगाने नकाशावर दर्शविलेल्या दोन्ही वळणांवर
उड्डाण केले, आणि भेटीनंतर, आम्ही नेव्हिगेटरवर विश्वास ठेवून परत जाण्याचा
निर्णय घेतला आणि सेरेगा आणि नास्त्या लगेच वळले आणि इतिहासाच्या
वाटचालीनुसार बिनशर्त बरोबर निघाले, आणि बाकीचे पहिल्या वळणावर परतले,
गुगलच्या मार्गाने खाली गाईड स्टेशनवर गेले. त्यांच्या दिसण्याने जास्त
आत्मविश्वास निर्माण होत नसल्यामुळे, आम्ही आपापसात फक्त रशियन भाषेत बोललो
आणि पुढे जाण्याचा निर्णय घेतला, ज्याला चढण्याचे ठिकाण म्हणून नियुक्त
केले आहे.
होय,
नक्कीच, आम्ही पुढे काय असू शकते ते वाचले आणि अगदी तयारही होतो. शो, जसे
की बाहेर वळले, स्थानिक लोक खूप चांगले करण्यास सक्षम आहेत. सुमारे 30 लोक
बाइकवरून आमच्या मागे धावले आणि ओरडत, ओव्हरटेक करत किंवा पुढे सरकत,
आमच्या सोबत होते.

आम्ही लॉन्च पॅडवर आलो, आम्ही पार्क केले आणि कारवाई सुरू झाली.
आम्हाला स्थानिकांनी घेरले आणि प्रश्न सुरू झाले, आम्ही का आलो, आम्हाला डोंगर चढायचा आहे का, आम्हाला मार्गदर्शकाची गरज आहे का.
आशियाई
देशासाठी ही एक सामान्य परिस्थिती आहे, एक सुरुवात झाली आहे, आम्ही सौदा
करण्याचा निर्णय घेतला, मी लगेच सांगेन की आम्ही प्रति व्यक्ती कमाल 100
हजार देऊ करण्यास तयार आहोत.
लाल
बंडानामधील एक इंडोनेशियन, जो परफॉर्मन्समध्ये अल्फा नराची भूमिका करतो,
क्लिअरिंगच्या मध्यभागी जातो, दोरीची कॉइल फेकतो आणि घोषित करतो की पर्यटक
येथे दररोज लटकतात))
पण,
स्थानिक खजुराच्या झाडांवर नारळाशिवाय काहीही सापडले नाही म्हणून, त्याने
त्याच्याशी सौदेबाजी सुरू केली, त्याने लगेच जाहीर केले की त्याला रशियन
आवडत नाहीत, कारण ते गुन्हेगारी व्यक्तिमत्त्व होते आणि अमेरिकन, जर्मन,
डच, ऑस्ट्रेलियन लोकांना पसंत करतात, कारण ते चांगले होते. लोक (आणि
दिसायला बार्गेन केले नाही) 350 प्रति व्यक्ती किंवा फिरून घरी जा.
सर्वसाधारणपणे,
त्यांच्याकडे 4 लोकांच्या गटासाठी मार्गदर्शकासाठी किमान किंमत 350 आहे
आणि आम्हाला त्याबद्दल माहिती होती, परंतु किंमत सवलत दिली गेली नाही.
मी
मैत्रीपूर्ण, विनोदाने बोलण्याचा प्रयत्न केला, म्हणालो की आम्ही
विद्यार्थी आहोत, मी गुन्हेगार रशियन नाही, परंतु सर्ब आहे, काहीही नाही.
10 मिनिटांनंतर, त्याने अटी सेट केल्या - एकतर आम्ही त्याच्या अटी मान्य
करतो किंवा आम्ही खाली आणतो. मी इतरांना बाजूला घेण्याचा प्रयत्न केला, पण
त्यांनी बोलण्यास नकार दिला.
मग त्यांनी आम्हाला बाइक्सकडे ढकलण्यास सुरुवात केली, म्हणून आम्ही मार्गदर्शकांच्या पार्किंगमध्ये परतण्याचा निर्णय घेतला.
पार्किंगमध्ये,
आम्ही ओलेगबरोबर मार्गदर्शकांच्या कार्यालयात जाण्याचा निर्णय घेतला आणि
शेवटच्या वेळी किंमत कमी करण्याचा प्रयत्न केला. आम्हाला किमतीची यादी
दाखवण्यात आली, जिथे तुम्हाला मार्गदर्शकासाठी 350 रुपये द्यावे लागतील असे
सामान्य इंग्रजीमध्ये लिहिले आहे, परंतु स्थानिकांनी प्रति व्यक्ती
किमतीचा दावा केला. वेळ 5 जवळ आली होती, आम्ही बतूर वरून पहाटे उडत होतो,
आम्हाला दुसरा पर्याय शोधायचा होता. डायनाने सरयोगाला फोन केला. असे झाले
की, तो ज्वालामुखीच्या दुसऱ्या बाजूला यशस्वीरित्या चढाईच्या बिंदूवर
पोहोचला आणि दक्षिण गोलार्धातील तारांकित आकाशाच्या वैशिष्ट्यांवर चर्चा
करत नास्त्यसह यशस्वीरित्या वर चढला. आणि आम्ही तिथे जायचे ठरवतो.
आम्ही
निघणार आहोत, आमचा रात्रीचा साथीदार आमच्याकडे येतो आणि पुन्हा एक बायनरी
प्रश्न विचारतो की आमच्याकडे 2 उत्तरे आहेत, एकतर होय किंवा नाही.
मी
म्हणतो की खरं तर त्याच्याकडे 2 उत्तरे आहेत - एकतर तो 700 साठी सहमत आहे
किंवा नाही. तो एक मिनिट मंद करतो, मग नाही म्हणतो आणि आम्ही निघतो.

नंतर
कधीतरी, जेव्हा मी मोठा आणि जाड झालो, राखाडी दाढी असलेला आणि यापुढे
रशिया सोडण्याची परवानगी नाही, तेव्हा या मानक गोपोव्स्काया वायरिंगबद्दल,
या देशातील हॉलंडच्या वसाहती धोरणाबद्दल आणि प्रभावाबद्दल त्या क्षणी मला
काय वाटले ते मी लिहीन. स्थानिक शेतकऱ्यांच्या अपरिपक्व मनावर पैसा.
दरम्यान, हे पूर्णपणे बरोबर नाही आणि बाली, या परिस्थितीचा अपवाद वगळता,
पूर्णपणे स्वतःच्या प्रेमात पडतो, म्हणून आम्ही 20 मिनिटांत बाईकवर एका
नवीन ठिकाणी उड्डाण केले. खरे आहे, रस्त्यावर, सापावर, कात्याच्या दुचाकीचे
ब्रेक अयशस्वी झाले. आम्ही ते झुडपात फेकून परत आल्यावर परिस्थिती
सोडवण्याचा निर्णय घेतला.
स्थानिक
वारुंगमध्ये, त्यांना एक माणूस सापडला जो मार्गदर्शक बनण्यास सहमत होता.
थोडा वेळ असल्याने, त्यांनी फारशी सौदेबाजी केली नाही आणि संपूर्ण गटासाठी
500 च्या किंमतीवर सहमती दर्शविली. ज्वालामुखीच्या या बाजूने चढणे जास्त
लांब आहे, यास सुमारे 3 तास लागू शकतात आणि शारीरिकदृष्ट्या कठीण आहे ...
मिमी, आम्ही रशियन आहोत, त्यामुळे पर्यायांबद्दल कोणतीही चर्चा झाली नाही.
मार्गदर्शक
खूप छान माणूस होता. परिसरात जन्मलेल्या, त्याने आयुष्यभर वारुंगमध्ये काम
केले आहे आणि वाळू उत्खनन करणाऱ्या ट्रक चालकांना कॉफी आणि सिगारेट विकणे
हे त्याचे जीवनाचे ध्येय आहे. ट्रॅकवर, त्याने निवांत वेगाने गटाचे नेतृत्व
केले.
चढाई
अवघड होती, आणि जेव्हा आम्ही सरयोग आणि नास्त्य होते त्या प्लॅटफॉर्मवर
पोहोचलो तेव्हा आम्ही खूप थकलो होतो. कात्या ताबडतोब झोपी गेला आणि बाकीचे
लोक प्रेक्षणीय स्थळांच्या शोधात विखुरले किंवा आश्चर्यकारक दृश्याचा आनंद
घेत आराम केला.


हे बतुर सरोवर आणि शेजारील पर्वत, उतारावर विखुरलेली गावे आणि हिरवाईचा समुद्र. आजूबाजूला, खडकांच्या फाट्यांमधून गरम वाफ बाहेर पडतात, ज्यावर अंडी उकळणे किंवा चहा उकळणे शक्य आहे.

जेव्हा सूर्याच्या पहिल्या किरणांनी दरी प्रकाशित केली तेव्हा प्रत्येकजण वर आला, दोनशे फोटो घेतले, उडी मारली आणि मागे सरकले.

आणि
खाली जाणे खूप सोपे असल्याने, मूड उत्कृष्ट होता आणि मी या सहलीचा अर्थ
लिटल रेड राइडिंग हूडचे विनामूल्य रीटेलिंग म्हणून केला, जिथे नायिकेने
देखील सुरुवातीला चुकीचा मार्ग निवडला. घड्याळात फक्त 9 वाजले होते
त्यामुळे चालत राहायचे ठरवले आणि आम्ही सगळे मिळून धबधब्याकडे निघालो.

बाली बेटाच्या आमच्या पुढच्या प्रवासात, आम्ही आधीच दुसर्या ज्वालामुखीवर चढलो आहोत - जो शेजारच्या जावा बेटावर आहे, परंतु त्याबद्दल अधिक पुढील लेखात 🙂
या
कथेवरून मी कोणते निष्कर्ष काढू शकतो? खरे सांगायचे तर, आम्ही अजूनही
रात्री बटूर चढलो नाही आणि ढगांमधून पहाट पाहिली नाही याची मला खूप निराशा
झाली. वैयक्तिकरित्या, मी, युलिया, मार्गदर्शकांनी आम्हाला सांगितलेले पैसे
द्यायला तयार होतो आणि त्याहूनही चांगले, आम्हाला ट्रॅव्हल एजन्सीमध्ये
आगाऊ ज्वालामुखीसाठी मार्गदर्शक सहल खरेदी करावी लागली. सुरुवातीला, आम्ही
अशा प्रकारे नियोजन केले, परंतु नंतर आम्ही एक कंपनी शोधली आणि ठरवले की ते
अधिक मनोरंजक असेल. होय, मजा आली, परंतु मूळ ध्येय साध्य झाले नाही. त्याच
वेळी, ज्वालामुखी ही अशी जागा नाही जिथे आपण एक दिवस किंवा दोन दिवसात
पुन्हा चढण्याचा प्रयत्न करू शकता, हा समुद्रकिनारा नाही. मला समजले की आपण
आता ज्वालामुखीवर चढू किंवा कधीच नाही. म्हणून, अर्थातच, मी अत्यंत नाराज
झालो की आम्ही योजना केल्याप्रमाणे सर्व काही घडले नाही. म्हणूनच मी आगाऊ
शिफारस करतो
जुलै 2015 मध्ये, इंडोनेशियाचे बाली बेट सर्वसामान्यांच्या चर्चेत होते. वरचे आकाश राखेने झाकले होते. हजारो पर्यटकांना विमानतळावर रोखण्यात आले. सरकारने स्थानिक रहिवाशांना नैसर्गिक आपत्ती झोनमधून बाहेर काढले. पण ते ज्वालामुखीच्या राखेच्या थराखाली होते. आणि अग्निशामक पर्वताच्या उतारावर असलेली अनेक गावे जळून खाक झाली. बालीमध्ये ही परिस्थिती किती वेळा येते? इंडोनेशियासाठी - एक घटना असामान्य नाही. तथापि, राज्य-द्वीपसमूह पृथ्वीच्या तथाकथित अग्निमय पट्ट्यामध्ये समाविष्ट आहे. पॅसिफिक महासागराच्या किनाऱ्यावर कामचटका ते विषुववृत्तापर्यंत पसरलेली ही पट्टी अजूनही आपल्या ग्रहाच्या वेगवान टेक्टोनिक क्रियाकलापांमुळे ग्रस्त आहे. पण बाली हे एक लोकप्रिय पर्यटन स्थळही आहे. पांढर्या वाळूचे विस्तीर्ण समुद्रकिनारे, गुरगुरणारे प्रवाह असलेले पर्वत, स्फटिक धबधबे आणि उष्णकटिबंधीय जंगलातील हिरवळ... या सर्व प्रथम श्रेणीच्या सेवेत आणि चांगल्या विकसित पर्यटन पायाभूत सुविधांमध्ये जोडा. प्रवासी जेव्हा या उष्णकटिबंधीय नंदनवनात येतात तेव्हा त्यांना खरोखर धोका असतो का? आमच्या लेखात याबद्दल वाचा.
स्फोटक इंडोनेशिया
दरवर्षी भूकंपशास्त्रज्ञ या देशात सुमारे सात हजार भूकंपांची नोंद करतात. संख्या नक्कीच प्रभावी आहे. परंतु ही वस्तुस्थिती तुम्हाला इंडोनेशियाला भेट देण्यापासून परावृत्त करू देऊ नका. हादरे फक्त संवेदनशील उपकरणांद्वारे नोंदवले जातात. परंतु, असे असले तरी, भूकंपशास्त्रज्ञ दक्षतेने जमिनीच्या खाली असलेल्या जमिनीच्या क्रियाकलापांचे निरीक्षण करतात शेवटी, हादरे ही अधिक धोकादायक घटनेची लक्षणे असू शकतात - ज्वालामुखीचा उद्रेक. इंडोनेशियातील हे पर्वत खरोखरच प्राणघातक आहेत. स्फोटाचा फक्त एक अग्रदूत - सल्फ्यूरिक वायूंचे प्रकाशन - जवळपासच्या सर्व सजीवांना मारू शकते. धुराचे स्तंभ अभेद्य धुक्याने संपूर्ण आकाश व्यापतात. गरम दगड पडत आहेत - ज्वालामुखीय बॉम्ब. आणि लावा खाली वाहतो, त्याच्या मार्गातील सर्व काही जाळून टाकतो. इंडोनेशियामध्ये पाचशे ज्वालामुखी आहेत. परंतु त्यापैकी केवळ 128 सक्रिय आहेत आणि 65 विशेषतः धोकादायक म्हणून ओळखले जातात. बालीमध्ये ज्वालामुखी धोकादायक आहेत आणि किती धोकादायक आहेत? आम्ही तुम्हाला आश्वासन द्यायला घाई करत आहोत की बहुतेक स्फोट सुमात्रामध्ये होतात. पर्यटकांच्या प्रिय "उष्णकटिबंधीय नंदनवन" मध्ये, परिस्थिती इतकी तणावपूर्ण नाही. जरी…

बाली मध्ये सक्रिय ज्वालामुखी
थोडे शांत होण्यासाठी, शालेय विज्ञान किंवा त्याऐवजी पाचव्या इयत्तेतील भूगोल लक्षात ठेवूया. ज्वालामुखी नामशेष, सुप्त आणि सक्रिय आहेत. शेवटच्या स्फोटाच्या तारखेच्या आधारे भूकंपशास्त्रज्ञ या किंवा त्या पर्वताला कोणत्या श्रेणीचे श्रेय द्यायचे हे ठरवतात. बाली हे मूळचे ज्वालामुखी बेट आहे. परंतु त्यावरील सर्व पर्वत संभाव्य धोकादायक नाहीत. शेवटी, बेट लाखो वर्षांपूर्वी तयार झाले. आणि जर हा किंवा तो ज्वालामुखी दहा हजार वर्षांपूर्वी शेवटच्या वेळी उद्रेक झाला तर त्याला विलुप्त म्हटले जाते. 3500 वर्षांपूर्वी जेव्हा तो सक्रिय होता तेव्हा त्याची नोंद सुप्त म्हणून केली जाते. आता बालीमधील परिस्थितीबद्दल. असे मानले जाते की या बेटावर फक्त दोन सक्रिय ज्वालामुखी आहेत. हे गुगुंग ("माउंटन") अगुंग आणि बतुर आहेत. बालीमधील इतर सर्व ज्वालामुखी नामशेष किंवा सुप्त आहेत. त्यामुळे या बेटावर तुम्ही सुरक्षितपणे जाऊ शकता. बालीमध्ये शेवटचा ज्वालामुखीचा उद्रेक 2000 मध्ये झाला होता. आपण याला खरा स्फोट म्हणू शकत नाही - गुगुंग बतुरने तीनशे मीटर उंच राखेचा स्तंभ बाहेर फेकून दिला आणि हा प्रकरणाचा शेवट होता. पण 1964 मध्ये खरा स्फोट झाला (त्याच ज्वालामुखीतून). गुगुंग अगुंग बेटाचा सर्वोच्च बिंदू बर्याच काळापासून सक्रिय नाही.

धोकादायक परिसर?
एका लहान बेटावर दोन सक्रिय ज्वालामुखी अजूनही खूप आहेत, भयभीत पर्यटक विचार करतील. आणि ते चुकीचे असतील. स्थानिक ज्वालामुखीच्या आसपासच्या लोकसंख्येची घनता पाहणे आवश्यक आहे, कारण तुम्ही थोडीशी भीती दूर कराल. लहान गावे अगदी खड्ड्यातही आढळतात. शेतकरी या अतिपरिचित क्षेत्राकडे आकर्षित होतात कारण खनिज समृद्ध ज्वालामुखीची राख मातीसाठी एक उत्कृष्ट खत आहे. उंचीच्या क्षेत्रीयतेमुळे, पर्वताच्या उतारांवर सौम्य सूक्ष्म हवामान तयार झाले आहे, जे चांगल्या कापणीसाठी अनुकूल आहे. पिकांना पाणी देण्यासही कोणतीही अडचण येत नाही, कारण पर्वतांच्या उतारावर अनेकदा थोडा वेळ पाऊस पडतो. बालीमधील कोणताही ज्वालामुखी स्थानिक लोकांद्वारे उच्च आदराने ठेवला जातो. उतारावरील मंदिरे याची साक्ष देतात. आणि ही संरचना जुनी असल्याने, आम्ही असा निष्कर्ष काढू शकतो की ज्वालामुखी असलेल्या परिसराला स्थानिक लोक धोकादायक मानत नाहीत. बालीमधील पर्यटन उद्योग या पर्वतांचा सहलीसाठी वापर करतात.
स्थानिक रहिवाशांसाठी ज्वालामुखीचे महत्त्व
इंडोनेशियन लोकांच्या धर्म आणि संस्कृतीत, पौराणिक पर्वत महामेरू हे विश्वाचे केंद्र होते. विश्वाचा हा अक्ष अर्ध्या भागात विभागला गेला. अगुंग आणि बतुर अशा प्रकारे उद्भवले - ज्वालामुखी, ज्याच्या वर देव राहतात. बालीमधील सर्व गावे बेटाच्या सर्वोच्च पर्वताच्या दिशेने आहेत. रहिवासी गुगुंग अगुंगकडे डोके ठेवून झोपायला जातात - जेणेकरून आत्मा देवांच्या जवळ असेल. आख्यायिका आहे की ज्वालामुखीच्या उदयापूर्वी हे बेट निर्जन आणि ओसाड होते. हे अंशतः खरे आहे: राख स्थानिक मातीला चांगले खत घालते. देव मोठ्या सुट्टीच्या दिवशी लोकांकडे खाली येतात आणि नंतर शीर्षस्थानी परत येतात. त्यांचा सन्मान करण्यासाठी ज्वालामुखीच्या उतारावर मंदिरे बांधण्यात आली आहेत. अगुंग हा बेटाचा सर्वात उंच पर्वत असल्याने, बेसाकिह कॉम्प्लेक्स हे सर्वात आदरणीय पूजेचे ठिकाण आहे. बालीमधील हा ज्वालामुखी बटारा महादेवाच्या (स्थानिक हिंदू धर्मात, शिव) च्या आश्रयाने आहे. दर शंभर वर्षांनी एकदा, अगुंगच्या उतारावरील बेसाकीह मंदिरात एका दास रुद्र सोहळा आयोजित केला जातो - "सर्व पापांचे जग स्वच्छ करणे." आणि 1963 मधील ही सुट्टी शोकांतिकेत बदलली.

अगुंग उद्रेक
1963 च्या वसंत ऋतूसाठी जागतिक शुद्धीकरण समारंभ नियोजित होता. तथापि, जेव्हा फेब्रुवारीमध्ये बालीमध्ये माउंट अगुंग जागे झाला तेव्हा याजकांनी सांगितले की रहिवाशांनी विधीसाठी चुकीची तारीख निवडली होती. म्हणा, शिवाला या दिवशी लोकांसमोर जायचे नाही आणि पर्वताच्या खड्ड्यातून धुराचे लोट निघत असल्याबद्दल आपला असंतोष व्यक्त करतात. ज्वालामुखीशास्त्रज्ञांनीही याजकांशी सहमती दर्शविली. त्यांनी इंडोनेशियाचे अध्यक्ष सुकर्णोला चेतावणी दिली की अगुंग क्रियाशीलतेची चिन्हे दर्शवत आहे आणि उद्रेक होऊ शकतो. तथापि, त्यांनी आधीच परदेशी शिष्टमंडळांना उत्सवासाठी आमंत्रित केले होते आणि समारंभ पुढे ढकलण्याची त्यांची इच्छा नव्हती. 18 मार्च 1963 रोजी अगुंग स्फोटाने सक्रिय टप्प्यात प्रवेश केला. विवराचे स्फोट झाले, लावा खाली उतरला. बेसाकीह मंदिराचे चमत्कारिकरित्या नुकसान झाले नाही. लाव्हाचा प्रवाह इमारतींपासून काही मीटर अंतरावर गेला. मात्र, त्यानंतर मोठ्या प्रमाणात लोकांचा मृत्यू झाला. आता ज्वालामुखीचा वरचा भाग चंद्राच्या लँडस्केपसारखा दिसतो, ज्याची पर्यटक प्रशंसा करतात. आणि स्थानिक अजूनही अगुंगचा सन्मान करतात. ते वक्र बांबूच्या पेंजोर खांबावर अर्पण लटकवतात, जे बाह्यरेखा बेटाच्या सर्वोच्च शिखरासारखे दिसते.

गुगुंग अगुंग
बालीमधील हा सर्वात उंच स्ट्रॅटोज्वालामुखी आहे - त्याचे शिखर समुद्रसपाटीपासून 3142 मीटर उंच आहे. हे बेटाच्या पूर्वेकडील भागात स्थित आहे. गुगुंग अगुंग नावाचे भाषांतर "ग्रेट माउंटन" असे केले जाते. निरीक्षणाच्या संपूर्ण इतिहासात, बालीमध्ये ज्वालामुखीचा उद्रेक फक्त चार वेळा झाला: 1808, 1821, 1843 आणि 1963-1964 मध्ये. नंतरचे सर्वात लक्षणीय आणि शक्तिशाली होते. मग दोन हजार लोक मरण पावले, लाव्हा आणि गाळ खाली आला. काही शास्त्रज्ञांच्या म्हणण्यानुसार, किरमिजी रंगाचा सूर्यास्त, जो तेव्हा युरोपमध्ये पाळला गेला होता, अगुंगच्या तोंडातून मोठ्या प्रमाणात राखेच्या वातावरणात सोडण्याशी संबंधित होते. स्फोटानंतर, विवराचे मापदंड देखील बदलले. आता ते पाचशे मीटर लांब आणि दोनशे रुंद ओव्हल फनेल आहे. 1980 च्या दशकात ज्वालामुखीने कमी क्रियाकलाप दर्शविला. 2000-2001 मध्ये, अगुंग जवळ स्प्रिंग्समध्ये असामान्यपणे उष्ण तापमान दिसून आले. आता "ग्रेट माउंटन" सुप्त आहे... ज्वालामुखीशास्त्रज्ञांच्या बारीक लक्षाखाली.

बाली मधील बतुर ज्वालामुखी
हा बेटावरील तिसरा सर्वात उंच पर्वत आहे. हे अगुंगच्या अगदी जवळ आहे. पर्यटकांसाठी बतूर हे गिर्यारोहणाचे आवडते ठिकाण आहे. का? प्रथम, उंची. 1717 मीटर तीन हजार नाही. हा प्रवास स्वतःच, जर तुम्ही सकाळी लवकर सुरू केला तर अर्धा दिवस टिकतो आणि तुम्ही समुद्रकिनाऱ्यांवर आराम करू शकता. दुसरे म्हणजे, बतुरच्या पायथ्याशी त्याच नावाचा तलाव आहे, जो परिसरातील सर्वात नयनरम्य आहे. ज्वालामुखीच्या उतारावर मंदिरे आहेत. बतूरच्या पर्यटन आकर्षणांपैकी एक म्हणजे गरम वाफेचे जेट्स. ते ज्वालामुखी सक्रिय असल्याची निष्काळजी प्रवाशांना आठवण करून देत पर्वताच्या विविध खड्ड्यांमधून मार्ग काढतात. या स्टीमच्या जेट्समध्ये स्क्रॅम्बल्ड अंडी शिजविणे शक्य आहे याची ग्वाही मार्गदर्शक देतात. बटूरचा शेवटचा स्फोट (अगुंग सोबतच्या युगल गीतात) 1964 मध्ये झाला. त्यानंतर, ज्वालामुखीने 2000 मध्ये तीनशे मीटरपर्यंत राखेचा स्तंभ फेकला, परिणामी आंतरराष्ट्रीय विमानतळ अनेक दिवस बंद होते. बतुर आता शांत आहे. केवळ वाफेचे जेट्स लपलेल्या धोक्याची चेतावणी देतात.
बटुकारू
हा बालीमधील दुसऱ्या क्रमांकाचा सर्वात मोठा ज्वालामुखी आहे. त्याची उंची दोन हजार तीनशे पन्नास मीटर आहे. या नामशेष ज्वालामुखीच्या उतारावर एक मंदिर देखील आहे - पुरा लुहूर. तिकडे जाणारा रस्ता जंगलातून चकचकीत माकडांसह जातो. या पर्वतावर चढताना पक्ष्यांच्या डोळ्यातून बेटाची चांगली छायाचित्रे घेण्याची शिफारस केली जाते.
कालदेरा चतुर
जेव्हा आपला ग्रह अजूनही तरुण होता, तेव्हा त्यावरील ज्वालामुखी फक्त प्रचंड होते. जेव्हा त्यांचा उद्रेक झाला, तेव्हा अनेक स्वतंत्र शिखरांसह कॅल्डेरस तयार झाले. असा आता चतुर आहे - अकरा किलोमीटरपर्यंत पसरलेला ज्वालामुखीचा कट्टा. सेनगायांग, पोहांग, लेसुंग आणि पेंगिलिंगन येथे फिरायला जातात, कारण हा प्रदेश थर्मल स्प्रिंग्ससाठी प्रसिद्ध आहे. ब्रॅटन, तांबलिंगन आणि बुयान - सुंदर तलाव देखील आहेत. चतुरच्या नैऋत्येस बटुकारू उगवतो, जो बालीमधील दुसरा सर्वोच्च ज्वालामुखी आहे.

2015 च्या उन्हाळ्यात काय झाले
तिसऱ्या जून रोजी बाली विमानतळावरील आकाश बंद झाल्याची बातमी आली. हे बेट एक लोकप्रिय पर्यटन स्थळ असल्याने या बातमीने चांगलीच खळबळ उडाली. बालीमध्ये नवीन ज्वालामुखीचा उद्रेक झाला आहे का? बतुर 1964 पासून झोपत आहे आणि अगुंग देखील. काय झालं? खरं तर, जावा आणि सुमात्रामध्ये भूकंपाची परिस्थिती आणखीनच बिकट झाली आहे. गोंगाटामुळे तो 2014 च्या सुरुवातीस उठला आणि सोळा लोकांचा मृत्यू झाला. हा पर्वत सुमात्राच्या उत्तरेस आहे. या वर्षाच्या उन्हाळ्यात, सिनाबुंगने ज्वालामुखीची राख आकाशात फेकली. दाट धुराचे स्तंभ दोन हजार मीटर उंचीवर पोहोचले, ज्यामुळे हवाई वाहतूक तात्पुरती अशक्य झाली. जुलैमध्ये, जावामधील आणखी दोन ज्वालामुखी जागृत झाले - गामालामा आणि रौंग. त्यांच्यामुळे नऊशे उड्डाणे रद्द करण्यात आली.
पर्यटक आकर्षण की गंभीर धोका?
तर बालीमधील ज्वालामुखींना घाबरायचे का? पर्यटकांच्या पुनरावलोकनांनुसार आणि बेटांच्या स्वतःचे मोजलेले आणि शांत जीवन दर्शविते, काळजी करण्याचे कोणतेही कारण नाही. ज्वालामुखी त्वरित आणि अनपेक्षितपणे जागे होत नाहीत. त्यांच्या उद्रेकापूर्वी स्त्रोतांच्या तापमानात वाढ, वायू सोडणे यासारख्या विविध घटना घडतात. बाली बेटावरील बतूर सारखा ज्वालामुखी पर्यटकांसाठी विशेषतः आकर्षक आहे.
https://bravoplanner.ru/mr/sovety/batur-kak-my-podnimalis-na-deistvuyushchii-vulkan-bali-indoneziya/
केटेवेल बीचच्या उदाहरणावर बालीमधील काळ्या ज्वालामुखीच्या वाळूसह किनारे. बालीमध्ये काळ्या ज्वालामुखीच्या वाळूसह समुद्रकिनारा कोठे आहे बारीक वाळू असलेला काळा समुद्रकिनारा बाली
जवळजवळ सर्व काळ्या किनारे बालीच्या पूर्वेकडील आणि आग्नेय भागात आहेत. काळा रंग ज्वालामुखीच्या उत्पत्तीच्या वाळूमुळे आहे. समुद्रकिनारे सूर्यप्रकाशात छान दिसतात, परंतु त्यात लक्षणीय कमतरता आहे - त्यापैकी बहुतेक पोहण्यासाठी व्यावहारिकदृष्ट्या अयोग्य आहेत. आज मी तुम्हाला बालीमधील सर्वोत्तम काळ्या वाळूच्या समुद्रकिनाऱ्यांबद्दल सांगेन. ही निसर्गाची खरी घटना आहे, पर्यटकांचे लक्ष वेधण्यासारखे आहे.
बालीच्या आग्नेय भागात स्थित, उबुडपासून अक्षरशः 30 मिनिटांच्या अंतरावर आहे. बालीनी भाषेतून, पूर्णामा नावाचे भाषांतर "पौर्णिमा" असे केले जाते. खरोखर काळ्या ज्वालामुखीच्या वाळूने झाकलेल्या काही समुद्रकिनाऱ्यांपैकी हा एक आहे, ज्यावरून त्याची छाप दुप्पट राहते. एकीकडे, हे मनोरंजक आणि असामान्य आहे, परंतु दुसरीकडे, आपण त्यावर आराम करू इच्छित नाही.
पौर्णमा पोहण्यासाठी योग्य नाही, जोरदार लाटा आणि धोकादायक प्रवाह येथे वर्षभर पाळले जातात. आणखी एक गैरसोय म्हणजे कचरा मोठ्या प्रमाणावर जमा होतो, त्याचे प्रमाण विविध समारंभांनंतर वाढते.

समुद्रकिनार्यावर जाणे अवघड नाही, किनाऱ्याजवळ सशुल्क पार्किंग आहे. बहुतेक अभ्यागत स्थानिक आहेत. लोक एकतर कॅफेमध्ये खातात किंवा फुटबॉल खेळतात. जवळपास राष्ट्रीय पाककृती असलेली अनेक आस्थापने आहेत.
साबा बीच
बालीच्या आग्नेयेला असलेला हा आणखी एक समुद्रकिनारा आहे. तो शोधणे अवघड नाही, कारण ते कॅन्डिदासूच्या मुख्य रस्त्याच्या बाजूने पसरलेले आहे. किनारपट्टीवर जाण्यासाठी, तुम्हाला तांदळाच्या टेरेस आणि राष्ट्रीय बालिनी गावातून गाडी चालवावी लागेल.
समुद्रकिनारा ज्वालामुखीच्या वाळूने झाकलेला आहे आणि चमकदार गडद रंगाची छटा आहे. समुद्रकिनाऱ्यावर पोहण्यास सक्त मनाई आहे, कारण येथे वर्षभर जोरदार लाटा आणि धोकादायक प्रवाह पाळले जातात. प्रत्येक शहराच्या हद्दीत, सर्फर्सची वाढती संख्या जमते. परंतु लक्षात ठेवा की येथे नवशिक्यांसाठी काहीही नाही. समुद्रकिनाऱ्याची वैशिष्ट्ये आणि लाटांची उंची केवळ अनुभवी ऍथलीट्ससाठी योग्य आहे.

कधीकधी पर्यटक किनाऱ्यावर घोडेस्वारीची व्यवस्था करतात; तुम्ही त्यांना जवळच्या व्हिला किंवा हॉटेलमध्ये भाड्याने देऊ शकता. अन्यथा, येथील पायाभूत सुविधा फारच विकसित नाहीत, रेस्टॉरंट नाहीत.
केरामस बीच
गडद ज्वालामुखीच्या वाळूने झाकलेला हा सर्वात विकसित समुद्रकिनारा आहे. हे सनूर जवळ आहे. त्याच नावाच्या गावाच्या सन्मानार्थ केरामास हे नाव पडले. येथे वाळू गारगोटीसह मिसळली जाते, जी बालिनी लोकांच्या जीवनात मोठ्या प्रमाणात वापरली जाते. स्थानिक रहिवासी त्यातून विविध स्मृतिचिन्हे बनवतात आणि घरे आणि कुंपण सजवण्यासाठी देखील वापरतात.
धार्मिक समारंभ अनेकदा समुद्रकिनार्यावर आयोजित केले जातात, काहीवेळा तेथे प्रार्थना करणारे भिक्षू असतात. एक सामान्य घटना म्हणजे बास्केटच्या स्वरूपात अर्पण करणे, जे सर्वत्र आढळू शकते. केरामास पर्यटकांमध्ये फारसे लोकप्रिय नाही, बहुतेकदा परदेशी काही तासांसाठी येथे येतात.

किनार्यापासून दूरवर अनेक छोटी हॉटेल्स आणि कॅफे आहेत. बहुतेक सर्फर येथे विश्रांती घेतात. त्यांच्यासाठी केरमास हा खरा स्वर्ग आहे. लाटा 10-30 मीटर लांबी, 2 मीटर उंचीपर्यंत पोहोचतात, ज्यामुळे केवळ व्यावसायिकांसाठी अनुकूल परिस्थिती निर्माण होते.
मस्केटी बीच
रिसॉर्टच्या उत्तरेकडील भागात असलेल्या मंदिराच्या सन्मानार्थ मस्केटी बीचचे नाव पडले. गडद ज्वालामुखीच्या वाळूने झाकलेल्या समुद्रकिनाऱ्यांपैकी हा एक उत्तम समुद्रकिनारा मानला जातो. दुर्दैवाने, मास्केटी परिपूर्ण स्वच्छतेचा अभिमान बाळगू शकत नाही; येथे धार्मिक समारंभ अनेकदा आयोजित केले जातात, त्यानंतर कचऱ्याचे प्रमाण लक्षणीय वाढते.

विशेषतः समुद्रकिनार्यावर ते सकाळी सुंदर असते, गडद वाळू सूर्यप्रकाशात चमकते, धातूची छटा मिळवते. समुद्रकिनाऱ्यावर पर्यटकांची मोठी गर्दी नसते, बहुतेक स्थानिक लोक येथे आरामशीर मनोरंजनासाठी येतात. सुट्टीतील लोकांच्या सोयीसाठी, अनेक आरामदायक कॅफे आहेत, जे प्रामुख्याने राष्ट्रीय खाद्यपदार्थ देतात. जवळच सशुल्क पार्किंग, शौचालय आहे. समुद्रकिनार्यावर प्रवेश करणे चांगले आहे, परंतु त्यावर पोहण्यास सक्त मनाई आहे.
लेबच बीच
सुंदर दृश्यांसह पर्यटकांना आकर्षित करणारा शांत समुद्रकिनारा. समुद्रकिनार्यावरील सुट्टीसाठी सर्वोत्तम ठिकाण नाही, परंतु आपल्याला निश्चितपणे सुंदर फोटो मिळतील. येथे पर्यटकांची संख्या जास्त नाही, अभ्यागतांचा मुख्य भाग स्थानिक लोकसंख्या आहे, जे सूर्यास्ताच्या जवळ लेबचला येतात, जेव्हा रस्त्यावर आता इतकी उष्णता नसते.

कुसंबा समुद्रकिनारा
पडांग खाडीपासून फार दूर नाही सर्वात सुंदर गडद वाळूचा समुद्रकिनारा - कुसंबा. त्याच्या असामान्य सावलीमुळे, हे स्थानिक लँडमार्क मानले जाते. कुसंबा जवळ एक गुप्त समुद्रकिनारा आहे, खरं तर, ते फक्त खडकांमुळे एकमेकांपासून वेगळे झाले आहेत.
समुद्रकिनारा वन्यांपैकी एक आहे, तेथे पर्यटकांची मोठी गर्दी नाही. बर्याचदा, स्थानिक लोक येथे मासेमारीसाठी येतात किंवा पर्यटक ज्यांना एकांतात राहायचे असते. पायाभूत सुविधा कोणत्याही प्रकारे विकसित झालेल्या नाहीत, मनोरंजन, कॅफे, रेस्टॉरंट्स आणि त्याहूनही अधिक म्हणजे हॉटेल्स पूर्णपणे अनुपस्थित आहेत.

कुसंबावर व्यावहारिकदृष्ट्या कोणतीही नैसर्गिक सावली नाही, म्हणून जर तुम्ही इथे यायचे ठरवले तर ते सकाळी किंवा सूर्यास्ताच्या जवळ करणे चांगले.
लोविना बीच
बालीच्या उत्तर किनाऱ्यावर स्थित आहे. हे पर्यटकांना काहीतरी खास आकर्षित करते असे म्हणता येणार नाही. इतर सर्व समुद्रकिनाऱ्यांप्रमाणेच, लोविना गडद वाळूने झाकलेले आहे. फायद्यांपैकी - लाटांची अनुपस्थिती, ज्यामुळे पोहणे अधिक सुरक्षित होते. तथापि, हे लक्षात घेतले पाहिजे की अशी ठिकाणे आहेत ज्यात मोठ्या प्रमाणात दगड आहेत. म्हणून, जेथे बहुतेक लोक जमतात तेथे पोहणे. सकाळी, तुम्ही मच्छिमारांसोबत खुल्या समुद्रात जाऊ शकता, जिथे तुम्हाला डॉल्फिन त्यांच्या नैसर्गिक अधिवासात राहणारे दिसतील.

लोविना हा तुलनेने स्वच्छ समुद्रकिनारा आहे, पावसाळ्यात कचरा साचलेला दिसून येतो, जेव्हा समुद्रातून मोठ्या प्रमाणात एकपेशीय वनस्पती आणि इतर गोष्टी बाहेर काढल्या जातात. येथे काही पर्यटक आहेत, बहुतेक स्थानिक लोक जे सूर्यास्ताच्या वेळी येथे येतात. पायाभूत सुविधा चांगल्या प्रकारे विकसित केल्या आहेत. येथे मोठ्या संख्येने व्यापार आणि स्मरणिका दुकाने आहेत, अनेक आरामदायक कॅफे आहेत. अनेक स्वस्त हॉटेल्स चालण्याच्या अंतरावर आहेत. समुद्रकिनार्यावर प्रवेश पूर्णपणे विनामूल्य आहे.
काळी वाळू सुरक्षित आहे का?
बालीमध्ये काळ्या वाळूचे किनारे असामान्य नाहीत. अर्थात, गडद रंग थोडासा घाबरवणारा दिसतो, कारण आपल्यापैकी प्रत्येकजण बेटांना बर्फ-पांढर्या वाळूने जोडतो, जे आकाशी महासागराच्या पाण्याशी उत्तम प्रकारे मिसळते.

गडद ज्वालामुखीय वाळू आरोग्यासाठी पूर्णपणे सुरक्षित आहे. त्याची निर्मिती ज्वालामुखीच्या उद्रेकाच्या परिणामी होते. लावा समुद्रात वाहतो, जिथे तो थंड होतो आणि दगडात बदलतो. पाण्याच्या प्रभावाखाली, घन पदार्थ हळूहळू तुटणे सुरू होते, लहान कण किनाऱ्यावर वाहून जातात, ज्यामुळे वाळू तयार होते. ते हातात घेण्यास मनाई नाही, त्यात कोणतेही विषारी घटक नाहीत. सामान्य वाळू, परंतु सामान्य रंग नाही. हिम-पांढरे किनारे आपल्या जवळ आहेत हे असूनही, निसर्गाच्या आणखी एका चमत्काराशी परिचित होण्यासाठी एक दिवस घालवणे योग्य आहे.
नकाशावर काळे किनारे
या नकाशावर, मी वर्णन केलेल्या समुद्रकिनाऱ्यांचे स्थान चिन्हांकित केले.
बालीमधील बहुतेक काळा किनारे पोहण्यासाठी योग्य नाहीत. त्या सर्वांची स्वच्छता ठेवली जात नाही. बहुतेकदा, अशा जमिनीचा भाग धार्मिक समारंभांसाठी वापरला जातो. तथापि, सूर्यास्ताच्या वेळी किंवा सकाळी येथे आल्यावर, आपण आश्चर्यकारकपणे सुंदर लँडस्केप्स पाहू शकता, ज्याच्या विरूद्ध आपण निश्चितपणे संस्मरणीय फोटो घेऊ इच्छित असाल.
एक आरामदायक समुद्रकिनारा, पेंढा असलेले कॉकटेल, अमर्याद समुद्र निळा, सोनेरी वाळू. पॅरामीटर्सद्वारे समुद्रकिनाऱ्याचे दृश्यमानपणे मूल्यांकन करून, आम्ही स्वतःसाठी निर्धारित करतो:
- छान समुद्रकिनारा, पण लाटा;
- उत्तम समुद्रकिनारा पण उथळ पाणी;
- समुद्र आणि समुद्रकिनारा अद्भुत आहे, परंतु तेथे बरेच लोक आहेत किंवा स्थान गैरसोयीचे आहे;
- समुद्रकिनारा गलिच्छ आहे, परंतु समुद्र चांगला आहे इ.
बाली किनारे वेगळे आहेत. समुद्रकिनार्याच्या क्षेत्रांबद्दल कल्पना ठेवण्यासाठी आणि सुट्टीचे नियोजन करताना निराश होऊ नका, चला समुद्रकिनारे अधिक चांगल्या प्रकारे जाणून घेऊया. बाली किनाऱ्यांचा नकाशा पहा:
बीच नैऋत्य
बालीमधील पांढरे वाळूचे किनारे हे पश्चिम आणि दक्षिणेकडील प्रदेशांसाठी प्राधान्य आहे.
विकसित पायाभूत सुविधांसह लांब, गोंगाट करणारा, गर्दीचा कुटा बीच. वालुकामय तळासह, खूप स्वच्छ नाही. बजेट हाऊसिंग आणि अतिथीगृहे आहेत. रात्रीचे वादळी जीवन तरुणांना आकर्षित करते. सर्फर्सचा मक्का, अनेक सर्फ शाळा रशियन लोकांसाठी डिझाइन केल्या आहेत.
लांब आणि फॅशनेबल लेजियन बीच कुटा झोन सुरू ठेवतो. कमी भरतीच्या वेळी ते खूप रुंद होते. ट्रेकिंग आणि धावण्यासाठी उत्तम. कुटापेक्षा गृहनिर्माण अधिक महाग आहे. पोहण्यासाठी योग्य नाही, फक्त सर्फिंगसाठी. पायाभूत सुविधा चांगल्या प्रकारे विकसित केल्या आहेत.
विस्तीर्ण आणि प्रतिष्ठित Seminyak समुद्रकिनारा Legian च्या मागे सुरू होतो. लाटा उंच आहेत, बरेच सर्फर आहेत. गृहनिर्माण महाग आहे - आदरणीय हॉटेल्स आणि व्हिला. समुद्रकिनार्यावरील उपकरणे, सर्फ बोर्ड भाड्याने आहे.
काही किलोमीटरची वालुकामय पट्टी - जिम्बरन समुद्रकिनारा. किनार्याजवळ पाणी उथळ आहे, पुढे खोली सुरू होते. तळ चांगला आहे. समुद्राची भरतीओहोटी एका पातळ पट्टीपर्यंत "अरुंद" करते. समुद्रकिनाऱ्यावर 4* आणि 5* हॉटेल्स आणि फिश रेस्टॉरंट्स आहेत.
बेटाच्या (ड्रीमलँड बीच) सर्वात सुंदर समुद्रकिनाऱ्यांच्या यादीत हे योग्यरित्या सन्माननीय स्थान घेते. बारीक वाळू, नीलमणी खवळलेला समुद्र. येथे नेहमीच बरेच सर्फर असतात. आरामदायक कॅफेमध्ये स्वादिष्ट अन्न. पायाभूत सुविधा विकसित केल्या.
बारीक पिवळसर वाळू असलेल्या विस्तीर्ण बालंगण बीचवर गर्दी नाही. जवळच्या खडकावरून समुद्रकिनारा आणि त्याच्या "मार्टियन लँड" चे आकर्षक दृश्य. सर्वत्र कॅफे आणि सन लाउंजर्स आहेत. शूजमध्ये पाणी शिरल्याने पोहणे कठीण होते. पण समुद्रकिनाऱ्याचे फोटो चमकदार आहेत आणि सर्फर्सना समुद्रकिनारा आवडतो.
छोटा आणि शांत पडांग पाडांग बीच. एकदा तो एक गुप्त समुद्रकिनारा होता, फक्त स्थानिकांनाच त्याबद्दल माहिती होती. आता लोकप्रिय. किनारा चांगला आहे आणि पाणी स्वच्छ आहे. काही लाटा आहेत, जे बाली बेटासाठी असामान्य आहे. पीक सीझनमध्ये येथे गर्दी असते. सन लाउंजर्स नाहीत, तुम्ही फक्त छत्र्या भाड्याने घेऊ शकता. एक माफक कॅफे, समुद्रकिनारा आणि आंघोळीसाठी उपकरणे असलेले तंबू आहे. हॉटेल-रेस्टॉरंट ब्लू हेवनचे ठळक वैशिष्ट्य, चट्टानच्या उंचीवर स्थित आहे - "पूलच्या काठावर चालत आहे." समुद्रकिनारा कुटुंबांसाठी चांगला आहे.
Bingin बीच सर्फिंग, निसर्ग प्रेमी आणि रोमँटिक फोटो शूटसाठी योग्य आहे. तळ वालुकामय, लाटा आणि भरपूर फोम आहे. आदरणीय अनंत पूल असलेली अनेक हॉटेल्स आहेत.
पांढरा पांडवा समुद्रकिनारा. गर्दी नाही, पोहायला आणि सूर्यस्नानासाठी योग्य, पण इथे हॉटेल्स नाहीत. विस्तारित प्रदेश, समुद्राचे स्वच्छ पाणी. समुद्रकिनार्यावर अनेक कॅफेसह चालण्याचा मार्ग आहे; कयाक भाड्याने; मसाज सलून. नैसर्गिक स्टॅलेक्टाइट लेणी, पुतळ्यांसह कार्यरत बालिनी मंदिर - समुद्रकिनाऱ्याचा एक तुकडा ..
पांढरा-वाळूचा समुद्रकिनारा निक्को (निक्को बीच). लहान आणि लांब. समुद्रकिनाऱ्यावर फक्त 1 ग्रँड निक्को हॉटेल आहे. आरामदायी वातावरण, ज्वालामुखीचे विहंगम दृश्य.
गेगर बीच सर्वोत्तम समुद्रकिनाऱ्यांच्या यादीत आहे. समुद्र स्वच्छ आहे, समुद्रकिनारा छान वाळू आहे. जवळचे ब्रेकवॉटर आणि कोरल रीफ समुद्राला शांत करतात. तेथे अनेक कॅफे आणि मनोरंजन आहेत - कॅनोइंग, स्नॉर्कलिंग, विंडसर्फिंग. जवळपासची हॉटेल्स समुद्रकिनाऱ्यावर मोफत शटल सेवा देतात.
नुसा दुआचे किनारे (नुसा दुआ बीच). त्यांच्या हद्दीत अनेक पंचतारांकित हॉटेल्स आहेत. समुद्रकिनाऱ्यांवर सर्वत्र तुम्ही हॉटेलचे पाहुणे असल्याशिवाय राहू शकत नाही. स्वच्छता आणि लांबी, उथळ किनारपट्टीचे पाणी. पोहणे, विंडसर्फिंगसाठी बीच. कमी भरतीच्या वेळी, उथळ सरोवर तयार होतात. रोमँटिक आणि कुटुंबांसाठी योग्य. समुद्रकिनार्याच्या क्षेत्राचा एक भाग म्हणजे तनजुंग बेनोआचे वालुकामय थुंकणे. स्पेस सूटमध्ये समुद्रतळाच्या बाजूने आकर्षक वॉक आयोजित केले जातात.
परिपूर्ण सर्फ
सर्फिंगसाठी कोणता बीच चांगला आहे याचे उत्तर देणे कठीण आहे. सर्फिंग हे बेटाचे वैशिष्ट्य आहे. कांगू बीच. येथे एक लहर पकडा आणि सर्फर-गुरू आणि नवशिक्या. तळाची रचना कुटापेक्षा अधिक शक्तिशाली आणि उच्च लहर तयार करण्यास योगदान देते. राहण्याची सोय आहे. काही हॉटेल्सचे स्वतःचे लाउंज क्षेत्र आहे. भरपूर आरामदायक कॅफे.
इको बीच हा कांगूचा शेजारी आहे. त्यांच्या दरम्यानची सीमा बालिनी मंदिर आहे. एक बार-कॅफे आहे. सर्फिंगसाठी अनुकूल परिस्थिती.
उलुवातु बीच (सुलुबान म्हणूनही ओळखले जाते) खडकाच्या मध्ये लपलेले आहे. भरतीमुळे ते भरून गेले आहे. उंच लाटा अनुभवी सर्फर्सना आकर्षित करतात. त्यांच्यासाठी पायाभूत सुविधा विकसित आणि अनुकूल केल्या आहेत. भव्य महासागर पॅनोरमासह चट्टानवर एक कॅफे आहे.
आग्नेय किनारा
लाँग बीच सनूर (सनूर बीच). किनारा उथळ आहे आणि समुद्र शांत आहे. मुलांसाठी - उत्कृष्ट परिस्थिती. महागडी कोस्टल हॉटेल्स, कॅफे/रेस्टॉरंट्स. सनूर गावात स्वस्तात राहण्याची सोय आहे. उत्तम स्नॉर्कलिंग आणि डायव्हिंग. किनाऱ्यावर पादचारी आणि सायकल मार्ग आहे. ब्रेकवॉटरवर रोमँटिक मंडप फुलतात. स्थानिक आकर्षणांमध्ये सफारी पार्क आणि एक सुंदर धबधबा यांचा समावेश आहे. समुद्रकिनाऱ्यावरून प्रसिद्ध अगुंग दृश्यमान आहे.
स्वच्छ ब्लू लगून बीच स्कूबा डायव्हिंगसाठी योग्य आहे. समुद्राची भरतीओहोटीने भरलेली अरुंद किनारपट्टी. 2-3 मीटर उंचीवर कॅफे, मसाज पार्लरसह एक व्यासपीठ आहे.
कँडिडासा बीच. शांत, काळा आणि खडकाळ, समुद्रकिनार्यावरील सुट्टीसाठी योग्य नाही. चंडीदासची चीप खाजगी व्हिला आहे "संपूर्ण बीच फ्रंट" ज्यामध्ये अनंत पूल आणि आकाशी महासागराचे पॅनोरमा आहेत. "बीच फ्रंट" - एक व्हिला किंवा हॉटेल जेथे परदेशी पर्यटकांना समुद्रकिनार्यावर आराम करण्याची परवानगी आहे. "निरपेक्ष" पर्याय समुद्रात वैयक्तिक प्रवेश सूचित करतो.
बालीच्या पूर्व आणि उत्तरेकडील किनारे
बाली मधील काळ्या वाळूचे किनारे उत्तर आणि पूर्व बेट प्रदेश आहेत.
Amed बीच - खडकाळ आणि "काळा". समुद्र शांत आहे. समुद्रकिनाऱ्यापासून 5 मीटर अंतरावर कोरल आणि विदेशी जिवंत प्राणी आढळतात, म्हणून येथे स्नॉर्कलिंग उत्कृष्ट आहे.
तुलांबेन समुद्रकिनारा गोताखोरांनी निवडला आहे. नवशिक्यांसाठी ऑब्जेक्ट किनाऱ्यापासून 30 मीटर अंतरावर बुडलेले जहाज आहे.
पांढरा वाळूचा समुद्रकिनारा हा काळ्या वाळू-ज्वालामुखीचा समावेश असलेली पांढरी-वाळूची पट्टी आहे. समुद्राचे पाणी पारदर्शक आहे, लाटा नाहीत. बालीनीज पर्यटन केंद्रांपासून दूर असल्यामुळे समुद्रकिनारा गर्दी करत नाही. जवळपास डझनभर आरामदायक रेस्टॉरंट्स आणि कॅफे आहेत जे त्यांच्या अतिथींना छत्र्या, टॉवेल, स्नॉर्कलिंग उपकरणे, सन लाउंजर्स विनामूल्य देतात. बेटाच्या पूर्वेला, हा एकमेव समुद्रकिनारा आहे जो पोहण्यासाठी आणि सनबाथसाठी योग्य आहे. नयनरम्य चट्टान ही एक नैसर्गिक समुद्र किनारा आहे. समुद्रकिनाऱ्याजवळ घरे नाहीत.
बालीच्या उत्तरेकडील विस्तीर्ण किनारे लोविना (लोविना बीच) या नावाने एकत्रित केले आहेत. काळ्या, राखाडी ज्वालामुखीच्या वाळूसह एक पिवळा-वालुकामय किनारा आहे. सागर काळजी करू नका, घर उपलब्ध आहे. मुलांसाठी छान समुद्रकिनारा. कॅफे आणि रेस्टॉरंटमध्ये नेहमीच ताजे सीफूड असते. डॉल्फिनला फिरणे हा समुद्रकिनाऱ्यावरील आकर्षक क्रियाकलापांपैकी एक आहे. हे करण्यासाठी, बोटी लोविना घाटातून समुद्रात जातात.
वायव्य बालीचे किनारे पेमुटेरन गावाजवळ, सभ्यतेपासून दूर आहेत.
खाजगी बीच असलेली हॉटेल्स
"खाजगी किनारे". ते हॉटेलद्वारे प्रवेश करू शकतात. पण, हॉटेलचे पाहुणे नसणे, ही समस्या आहे. खाजगी समुद्रकिनारा असलेल्या हॉटेल्सपैकी नुसा दुआ मधील सामाबे रिसॉर्ट आहे.
अयाना रिसॉर्ट आणि स्पा च्या बीचचा स्वतःचा घाट आणि खडकाळ किनाऱ्यावर एक असामान्य रॉक बार आहे.
पोंडोक व्हिएन्ना बीच आणि त्याच नावाचा समुद्रकिनारा हे साधे हॉटेल बुनुतान गावात आहे. खोली सोडताना, काळ्या आणि पांढर्या वाळूवर 15-20 पावले चालत असताना, आपण स्वत: ला समुद्रात सापडतो. परंतु खोलीची किंमत जास्त महाग आहे.
निर्जन किनारे
लांब आणि जंगली न्यांग न्यांग बीच सर्फर्समध्ये लोकप्रिय आहे. 500 हून अधिक पायर्या पार करून, उष्णकटिबंधीय झाडेझुडपे पार करून, कड्यावरून पायऱ्या उतरून तुम्ही त्यावर पोहोचू शकता. पांढरी वाळू आणि अंतहीन निळा-फिरोजा महासागर. काही ठिकाणी, तळाशी, चंद्राच्या लँडस्केपप्रमाणे, खाचांसह खडकाळ आहे.
निर्जन, जवळजवळ जंगली न्यांग न्यांग बीच. काही ठिकाणी किनारा शंखांनी वालुकामय आहे. पायाभूत सुविधा नाहीत. निर्जन विश्रांतीच्या प्रेमींसाठी, विश्रांतीच्या चाहत्यांसाठी उपयुक्त. या समुद्रकिनाऱ्यावर चालणे आणि सूर्यस्नान करणे हे उत्तम उपक्रम आहेत, परंतु पोहण्यासाठी कोणत्याही अटी नाहीत. सर्फर्ससाठी बीच. परंतु ते कमी आहेत आणि ते किनाऱ्यापासून 100 मीटर अंतरावर सायकल चालवतात.
गुप्त किनारे
जिम्बरन जवळ, एका निखळ चट्टानाखाली, सिक्रेट बीच नावाचा एक छोटासा गुप्त समुद्रकिनारा आहे. खडकाळ तळ आणि मजबूत लाटा तळाशी आहेत. वरून तुम्ही डोंगराळ कठडा, फेसाळलेल्या लाटा आणि निळसर महासागर पाहू शकता. लाटांनी खडबडीत, परंतु फोटोजेनिक कोबलस्टोन अनेक ठिकाणी मॉसने वाढलेले आहेत. लग्नाच्या फोटोग्राफीसाठी रोमँटिक स्थान.
आणखी एक "गुप्त समुद्रकिनारा". पडंग बाई जवळ. बर्फाच्छादित बारीक वालुकामय बायस तुगाल समुद्रकिनारा मुले, गोताखोर आणि हिरव्या पर्यावरणीय पर्यटनाचे चाहते असलेल्या कुटुंबांना आकर्षित करेल.
बाली किनारे आशियाई विदेशीपणाच्या अप्रतिम जगाला स्पर्श करण्यासारखे आहेत.
समुद्रकिनारा हरवला आहे कारण किनाऱ्यावर चालत असताना त्यावर "अडखळणे" इतके सोपे नाही. बर्याच काळापासून, आश्चर्यकारक पेरासी बीच पर्यटकांना माहित नव्हते. अर्थात, बाली लोकांसाठी तो शतकाचा शोध नाही. त्यांच्यासाठी, सर्वसाधारणपणे, समुद्रकिनारा कॉकटेलसह थंड होण्याची जागा नाही. समुद्र हा एक घटक आहे ज्याच्याशी स्थानिक लोक धार्मिक विधी पार पाडण्यासाठी संपर्कात येतात. तथापि, समुद्रकिनारा सापडला आहे आणि चला ते शोधूया. त्याचे स्थानिक नाव त्वरीत विसरले गेले आणि त्याची जागा हिडन बीच (हरवलेला समुद्रकिनारा), व्हर्जिन बीच (व्हर्जिन बीच), व्हाईट सँड (पांढरी वाळू, जी इंडोनेशियन भाषेत पासीर पुतिह सारखी वाटते) ने घेतली. व्हाईट सँड नावाने पर्यटकांसाठी पुनरावलोकने आणि मार्गदर्शक पुस्तकांमध्ये त्वरीत स्वतःची स्थापना केली.
या निर्जन जागेच्या शोधात, जवळच्या वसाहतींच्या नावांसह स्वत: ला परिचित करणे योग्य आहे. हा निर्जन किनारा दोन टेकड्या आणि करंगासेम रिजन्सीमधील बगबग आणि पेरासी गावांच्या मध्ये स्थित आहे, चंडीदासाच्या सुप्रसिद्ध पर्यटक गावापासून सुमारे 4.5 किलोमीटर अंतरावर आहे.

समुद्रकिनाऱ्यावर सहज जाण्यासाठी हे पुरेसे नाही. तुमचा मार्ग कँडिडासा गावाच्या मुख्य चौकापासून जालान राजा कॅंडिडासा-बगबगच्या दिशेने जातो, तिथून तुम्ही पेरासी गावात पोहोचता. संदर्भ बिंदू मंदिर (पुरा) बाले अगुंग आहे. तुम्ही Candidasa येथून आल्यास, ते तुमच्या डावीकडे असेल. इथून आधीच तुम्हाला सुमारे 1 किलोमीटर लांबीचा ट्रेकिंग (खडकाळ आणि कच्च्या रस्त्याने, किंवा ऑफ-रोड - तुमच्या इच्छेनुसार) मिळेल. आमच्यासाठी सुदैवाने, वाटेत चिन्हे आहेत.

आणि येथे बहुप्रतिक्षित तमाशा आहे. तुमची नजर बाली समुद्राच्या पूर्णपणे शांत लाटांकडे उघडते, गिली बिहा बेट दूरवर दिसते आणि वाळू, जरी तिला पांढरे म्हटले जाते, त्यात काळ्या ज्वालामुखीच्या नसा आहेत. समुद्रकिनाऱ्याचे थेट वाऱ्यापासून संरक्षण करणाऱ्या विशाल दगडांनी शांत लाटा आणि मऊ वाळूचा विरोधाभास केला आहे.
येथे वाहने ठेवण्याची जागा आहे. "व्हर्जिन बीच" त्वरीत प्रवासी आणि विविध सेवांचे आयोजक दोघांनीही प्रभुत्व मिळवले आहे. जेवणासाठी, डझनभर कॅफे (वारुंग) ची निवड आधीच आहे जी तुम्हाला छत्री आणि पलंग दोन्ही प्रदान करेल. मासेमारी, सेलबोट सहली आणि स्कूबा डायव्हिंग आयोजित करण्यासाठी सेवा देखील आहेत.
बाली हे एक नंदनवन बेट आहे, जे इंडोनेशिया राज्याच्या मालकीच्या लेसर सुंडा बेटांचा एक भाग आहे. त्याचा दक्षिणेकडील भाग हिंदी महासागराने आणि उत्तरेकडील भाग बाली समुद्राने धुतला आहे, जो थेट प्रशांत महासागरात आहे. हे सुंदर ठिकाण निसर्गाच्या अवर्णनीय सौंदर्यासाठी प्रसिद्ध आहे ज्यामध्ये विलक्षण जंगल, भातशेती, पर्वत तलाव, धबधबे, ज्वालामुखी आणि अर्थातच महासागर आहे. बालीमधील सर्वोत्तम समुद्रकिनारे वर्षभर जगभरातील हजारो पर्यटकांना आकर्षित करतात. जोरदार वारा आणि मोठ्या लाटा हे या बेटाचे वैशिष्ट्य बनले आहे; त्यांच्यासाठी जगभरातून मोठ्या संख्येने सर्फर बालीला येतात. परंतु आरामशीर समुद्रकिनारा सुट्टीसाठी बालीमध्ये लाटाशिवाय सुंदर शांत ठिकाणे शोधणे देखील शक्य आहे. आमच्या लेखात, आम्ही सशर्त शीर्ष 10 बनवून या बेटावरील सर्वोत्तम समुद्रकिनारे रँक करण्याचा प्रयत्न केला.
वादळ आणि समुद्राच्या कमी भरतीनंतर बालीमध्ये किनारे बरेचदा गलिच्छ असतात या वस्तुस्थितीसाठी तयार रहा. पाणी पुष्कळ मलबा आणि शैवाल किनाऱ्याला धुवू शकते. परंतु हे नेहमीच घडत नाही, आणि जेव्हा तुम्ही दुसऱ्या दिवशी त्याच ठिकाणी पोहोचता तेव्हा तुम्हाला पूर्णपणे स्वच्छ पाणी आणि स्वच्छ किनारा मिळेल. आपण अचानक हवामानासह दुर्दैवी असाल तर आपण समुद्रकिनाऱ्याबद्दल निष्कर्ष काढू नये.
10. जिम्बरन समुद्रकिनारा
सर्वसाधारणपणे, मजबूत लाटांशिवाय पोहण्यासाठी बालीमधील सर्वोत्तम किनारे बेटाच्या दक्षिणेकडील आणि आग्नेय भागात आहेत. आमची यादी जिम्बरान नावाच्या ठिकाणासह उघडते, जे कुटा शहराच्या दक्षिणेला त्याच नावाच्या एका छोट्या गावात आहे. येथे पार्किंगची कोणतीही समस्या नाही, म्हणून तुम्ही भाड्याने घेतलेल्या वाहतुकीने सुरक्षितपणे जाऊ शकता. या ठिकाणी पायाभूत सुविधा अतिशय चांगल्या पातळीवर विकसित झाल्या आहेत. अनेक हॉटेल्स, दुकाने, कॅफे आणि रेस्टॉरंट्स आहेत. समुद्रकिनारा स्वतःच हलक्या वाळूने झाकलेला एक लांब किनारा आहे, येथील प्रवेशद्वार कोमल आहे, जो निःसंशयपणे मुलांसह जोडप्यांसाठी समुद्रकिनार्यावर सुट्टीसाठी योग्य आहे.
दिवसा येथे वालुकामय समुद्रकिनारा आणि महासागर असे काही विशेष नसते, परंतु सूर्यास्ताच्या वेळी हे ठिकाण विलक्षण वातावरणात व्यापलेले असते. लाटांचा आवाज, ताजी वारा आणि आकाश, क्षितिज सोडून सूर्याने अविश्वसनीय रंगात रंगवलेला. स्थानिक रेस्टॉरंट्स बीचवर टेबल आणतात आणि उत्कृष्ट ग्रील्ड डिश देतात. तुमच्या सुट्टीची किमान एक संध्याकाळ येथे घालवण्याची आम्ही शिफारस करतो.

9. कुटा / कुटा बीच

कुटा शहर, त्याच नावाच्या समुद्रकिनाऱ्यासह, बेटाच्या दक्षिणेकडील अनेक रिसॉर्ट क्षेत्रांसारखे स्थित आहे. विमानतळावरून थेट येथे पोहोचणे कठीण होणार नाही. शहरातच मोठ्या प्रमाणात हॉटेल्स, रेस्टॉरंट्स, बार आणि सर्व प्रकारच्या मनोरंजनाची ठिकाणे आहेत. कुटा किनार्यावरील वालुकामय समुद्रकिनारा खूप लांब आणि बराच रुंद आहे. इथे नेहमीच गर्दी असते, पण त्याच्या आकारमानामुळे इथे जास्त गर्दी जाणवत नाही, प्रत्येकासाठी पुरेशी जागा आहे.
येथील लाटा फार मोठ्या नाहीत, जर तुम्हाला सर्फ कसे करायचे हे शिकायचे असेल तर हे ठिकाण तुमच्यासाठी नक्कीच आहे. किनाऱ्यावर अनेक प्रशिक्षक आणि बोर्ड भाड्याने आहेत. दाट हिरव्या पट्टीमध्ये तटबंदीच्या बाजूने झाडे वाढतात, ज्याच्या सावलीत कडक उन्हापासून लपणे चांगले आहे. आणि संध्याकाळी, समुद्रकिनार्यावरील सुट्टीचा भरपूर आनंद घेतल्यानंतर, एका किनारपट्टीच्या रेस्टॉरंटमध्ये बसणे आणि एका काचेने हळूहळू समुद्रात बुडताना सूर्य पाहणे खूप आनंददायी आहे.

8. नुसा दुआ बीच

जर आपण नकाशावर पाहिले तर बुकिट द्वीपकल्पाच्या पूर्वेस नुसा दुआ नावाचा समुद्रकिनारा आहे. येथे अनेक आलिशान हॉटेल्स आणि रेस्टॉरंट्स आहेत आणि हे ठिकाण स्वतःच प्रीमियम क्लास मानले जाते. किनाऱ्यावरील सनबेड्सच्या भाड्याप्रमाणे या किनारपट्टीच्या प्रदेशात प्रवेश दिला जातो. समुद्रकिनारा स्वतःच मऊ हलक्या रंगाच्या वाळूने झाकलेला आहे, येथे समुद्र तुलनेने शांत आहे, उंच लाटा अत्यंत दुर्मिळ आहेत.
मुलांसोबत पोहण्यासाठी बालीच्या समुद्रकिना-याचा विचार केला तर हे ठिकाण नक्कीच लक्ष देण्यासारखे आहे. किनार्याजवळ एक लांब रस्ता आहे ज्यावर तुम्ही बाईक चालवू शकता किंवा धावू शकता. पाण्याजवळ सुंदर झाडे वाढतात, ज्याच्या सावलीत तुम्ही कडक उन्हापासून लपवू शकता किंवा फक्त छान फोटो घेऊ शकता.

7. केरामस बीच

बेटाच्या आग्नेयेला, सनूरपासून फार दूर, केरामस नावाच्या गावात, त्याच नावाचा समुद्रकिनारा आहे. तुम्ही भाड्याने घेतलेल्या वाहतूक किंवा टॅक्सीने येथे पोहोचू शकता. समुद्रकिनारा स्वतःच काळ्या ज्वालामुखीच्या वाळूने झाकलेला बऱ्यापैकी रुंद पट्टी आहे. जर तुम्ही सर्फिंगचे चाहते असाल तर या ठिकाणी न येणे हा खरा गुन्हा ठरेल. अनेकजण सर्फिंगसाठी बालीमधील सर्वोत्तम बीच म्हणतात. दरवर्षी या जलक्रीडामधील व्यावसायिकांच्या जागतिक सहलीच्या स्पर्धा येथे आयोजित केल्या जातात.
किनारपट्टीची पायाभूत सुविधा बर्यापैकी चांगल्या स्तरावर विकसित केली गेली आहे, आपल्याला आवश्यक असलेली प्रत्येक गोष्ट आहे: एक रेस्टॉरंट, बार, सर्फबोर्डचे भाडे आणि अनेक हॉटेल्स. जवळच एक डॉल्फिनारियम देखील आहे, जिथे आपण केवळ या सागरी जीवनाची प्रशंसा करू शकत नाही तर त्याच तलावामध्ये त्यांच्याबरोबर पोहू देखील शकता.
जर तुम्हाला सर्फिंगला जायचे असेल, तर आम्ही येथे एका दिवसासाठी हॉटेलची खोली भाड्याने घेण्याची शिफारस करतो - सर्वात मोठी लाट सकाळी लवकर किंवा संध्याकाळी उशिरा असते.
6. सेमिन्याक बीच (डबल सिक्स बीच)

कुटा शहराजवळील बेटाच्या दक्षिणेकडील भागात आणि Ngurah राई विमानतळापासून सुमारे 25 मिनिटांच्या अंतरावर, सुंदर वालुकामय किनारे, लक्झरी हॉटेल्स आणि महागड्या रेस्टॉरंट्ससह सेमिन्याक नावाचे प्रीमियम रिसॉर्ट क्षेत्र आहे. सेमिन्यक फॅशन शो, धर्मादाय कार्यक्रम आणि गोंगाटयुक्त पार्ट्यांचे आयोजन करते. या ठिकाणी बीच सुट्ट्या उत्तम प्रकारे मजेदार पक्षांसह एकत्र केल्या जाऊ शकतात. किनारा स्वतःच वाळूने झाकलेला एक सुसज्ज विस्तृत किनारपट्टी आहे.
एटी येथील लाटा सर्फिंगसाठी योग्य आहेत. लहान मुलांसह समुद्रकिनार्यावरील सुट्टीसाठी स्थानिक महासागर फारसा योग्य नसला तरीही, बरेच जोडपे येथे येतात कारण जवळपास तलाव आणि खेळाचे मैदान असलेली अनेक मुलांची केंद्रे आहेत.

5. गुनुंग पायुंग बीच

बालीमधील पोहण्यासाठी आमचे सर्वोत्तम समुद्रकिनारे बेटाच्या दक्षिणेकडील भागात असलेल्या गुनुंग पायंग नावाच्या ठिकाणासह सुरू आहेत. तुम्ही भाड्याने घेतलेल्या कार किंवा बाइकने तेथे पोहोचू शकता. पार्किंगपासून किनार्यापर्यंत, झुडुपे आणि झाडांच्या झुडपांमध्ये, पायऱ्यांसह एक मार्ग आहे, ज्याच्या बाजूने तुम्हाला खाली जावे लागेल. वाटेत, तुम्ही स्थानिक माकडे रस्त्याच्या कडेला एका फांदीवरून दुसऱ्या फांदीवर उडी मारताना पाहू शकता. समुद्रकिनारा स्वतःच एक वालुकामय पट्टी आहे जी हिरवाईने झाकलेल्या उंच कड्याखाली आहे.
हे लगेच लक्षात घेतले पाहिजे की समुद्रकिनारा विरळ लोकवस्तीचा आणि निर्जन आहे. सन लाउंजर्स नाहीत आणि पायाभूत सुविधा नाहीत. फक्त तुम्ही, निसर्ग आणि महासागर, ज्यामध्ये तुम्ही आरामात पोहू शकता, कारण येथे कधीही मजबूत लाटा नसतात, शेजारील खडक त्यांना किनाऱ्यावर पोहोचू देत नाहीत. आश्चर्यकारक पिरोजा रंगाचा महासागर नक्कीच कोणालाही उदासीन ठेवणार नाही. जर तुम्हाला बालीच्या पांढर्या वाळूच्या किनार्यांमध्ये रस असेल तर या ठिकाणी नक्की भेट द्या.

4. पडंग पडंग / पडंग पडंग बीच

बुकिट द्वीपकल्पावर, उलुवातुच्या नयनरम्य ठिकाणापासून काही किलोमीटर अंतरावर पडांग-पडांग बीच आहे. टॅक्सी किंवा भाड्याने घेतलेल्या वाहतुकीने येथे पोहोचणे कठीण नाही. जवळपास विनामूल्य पार्किंग आहे. समुद्रकिनारा हा पांढरा वाळू असलेला एक छोटासा समुद्रकिनारा आहे, ज्यावर एक नयनरम्य खडक लटकलेला आहे, ज्याच्या खाली आपण कडक उन्हापासून लपवू शकता. येथे कोणतेही सनबेड नाहीत, किनार्यावर अनेक तंबू आहेत जेथे आपण सहजपणे खाऊ शकता आणि रीफ्रेश पेय खरेदी करू शकता, तेथे विनामूल्य शौचालय आणि शॉवर आहे. पाण्याचे प्रवेशद्वार हळूहळू आहे आणि जर तुम्ही मुलांसोबत पोहण्यासाठी बाली किनारे निवडले तर पडंग-पडांग नक्कीच तुमच्यासाठी अनुकूल असतील.
एक उल्लेखनीय वस्तुस्थिती अशी आहे की येथेच मुख्य भूमिकेत ज्युलिया रॉबर्ट्ससह "इट, प्रे, लव्ह" चित्रपटाचे चित्रीकरण झाले.
3. पांढरा वाळूचा समुद्रकिनारा किंवा व्हर्जिन बीच (उर्फ पंताई पासीर पुतिह)

आम्ही बालीमधील शीर्ष तीन सर्वोत्तम किनारे उघडतो. बेटाच्या पूर्वेकडील भागात, अमलापुरा शहरापासून 4 मिनिटांच्या अंतरावर, व्हाईट सँड बीच नावाचा शांत आणि अतिशय सुंदर समुद्रकिनारा आहे. किनाऱ्याच्या वरच्या टेकडीवर पार्किंगची जागा आहे, तिथून तुम्हाला खाली चालावे लागेल. समुद्रकिनार्यावर प्रवेश करण्यासाठी पैसे दिले जातात आणि प्रति व्यक्ती फक्त 10,000 रुपये खर्च येतो. हे ठिकाण स्वच्छ नीलमणी पाणी आणि मऊ पांढरी वाळू असलेले दीड किलोमीटरचे सरोवर आहे. समुद्रकिनाऱ्याभोवती खजुरीची झाडे आणि विदेशी झाडे वाढतात. समुद्रकिनार्यावर एक कॅफे आणि विनामूल्य सनबेड आहेत. पोहण्यासाठी, किनाऱ्याच्या डाव्या बाजूला शिफारस केली जाते, उजव्या बाजूला तळाशी कोरल रीफ आहे.
या ठिकाणाचे वैशिष्ट्य म्हणजे एक बेट आहे, ज्यावर एकाकी झाड उगवलेले आहे, ते किनार्यापासून फार दूर नाही. आम्ही जोरदार शिफारस करतो की तुम्ही स्थानिक बोटमॅनसह व्यवस्था करा आणि या रोमँटिक बेटाला भेट द्या. जर तुम्ही बालीमधील सर्वात सुंदर समुद्रकिनारे शोधत असाल जिथे तुम्ही प्रचंड लाटांना न घाबरता पोहू शकता, तर या ठिकाणी नक्की भेट द्या.

2. सीक्रेट बीच / सीक्रेट बीच किंवा बायस तुगल बीच (उर्फ पंताई केसिल)

बालीच्या आग्नेय भागात सिक्रेट बीच नावाचा आणखी एक अतिशय उल्लेखनीय समुद्रकिनारा आहे. हे पाडांग खाडीच्या बंदराशेजारी आहे. समुद्रकिनार्यावर जाण्यासाठी, बंदरावर पोहोचण्यापूर्वी तुम्हाला उजवीकडे वळावे लागेल आणि टेकडीच्या माथ्यावर पार्किंगच्या ठिकाणी जावे लागेल, जेथून तुम्हाला पायी खाली जावे लागेल. तसे, किनाऱ्याचे सर्वात नयनरम्य दृश्य पार्किंगमधून उघडते. समुद्रकिनाऱ्याभोवती उगवलेल्या पाम वृक्षांसह आश्चर्यकारक आकाशी समुद्र आणि पांढरी वाळू, खरोखर स्वर्गीय ठिकाणाचे अवर्णनीय वातावरण तयार करतात. समुद्रकिनार्यावर लहान कॅफे आहेत जिथे तुम्ही खाऊ शकता आणि पेय खरेदी करू शकता. समुद्रकिनाऱ्यावर सन लाउंजर्स नाहीत. हे ठिकाण निःसंशयपणे जंगली बीच सुट्टीच्या प्रेमींनी कौतुक केले जाईल.

1. मेलास्टी / मेलास्टी बीच

आणि शेवटी, बालीमधील सर्वोत्कृष्ट समुद्रकिनाऱ्यांपैकी पहिले स्थान. बेटाच्या दक्षिणेकडील भागात एक आश्चर्यकारक ठिकाण आहे - मेलास्टी बीच. तुम्ही भाड्याने घेतलेल्या कार, बाईक किंवा टॅक्सीने तेथे पोहोचू शकता. समुद्रकिनाऱ्याजवळ एक कार पार्क आहे. पिरोजा शेड्स आणि नाजूक पांढर्या वाळूचा आश्चर्यकारक समुद्र एक अमिट छाप पाडतो. समुद्रकिनारा जवळजवळ नेहमीच विरळ लोकवस्तीचा असतो (रविवारचा अपवाद वगळता, जेव्हा स्थानिक लोकसंख्या येथे येते). येथे तुम्ही सभोवतालच्या सौंदर्याचा आणि शांततेचा आनंद घेण्यासाठी तासनतास घालवू शकता. पायाभूत सुविधांमध्ये छत्र्यांसह सशुल्क सनबेड, एक रेस्टॉरंट आणि लहान तंबू आहेत जेथे तुम्ही पेये खरेदी करू शकता. आमच्या मते, हा बेटावरील सर्वात सुंदर समुद्रकिनारा आहे, जिथे तुम्हाला पुन्हा पुन्हा परतायचे आहे.
मला बालीमधील काळ्या वाळूचे किनारे आवडतात. येथील वाळू मऊ, सौम्य आणि हजारो लहान ताऱ्यांसह चमकणारी आहे. आणि तारे मीठाशिवाय काहीच नाहीत.
समुद्री मीठ ही खरी जादू आहे. हा एक अविश्वसनीयपणे उपयुक्त आहे, अनेक प्रकारे, पृथ्वीचा घटक. मी शरीरातील मीठ वापरतो, फरशी मिठाने धुतो आणि घराभोवती मीठ शिंपडतो, त्यामुळे स्थानिक लोक त्यांच्या घराचे सापांपासून संरक्षण करतात.
मीठ हा एक पूर्णपणे नैसर्गिक पदार्थ आहे ज्यामध्ये पृथ्वीची ऊर्जा आणि शहाणपण आहे. आणि इथे तुमच्या विल्हेवाटीवर ज्वालामुखीची वाळू आणि मीठ असलेला अंतहीन समुद्रकिनारा आहे. प्रत्येकासाठी नैसर्गिक SPA. अगदी मोफत, फक्त भेट म्हणून.
म्हणूनच मला बालीमधील काळ्या वाळूचे किनारे आवडतात. ते अलोकप्रिय आहेत, लक्षात ठेवा. त्यांच्याबद्दल फार कमी लोकांना माहिती आहे. समुद्राची भरतीओहोटी असल्याशिवाय तुम्ही त्यांच्यावर पोहू शकत नाही. येथे येण्याचे एकमेव कारण म्हणजे निसर्ग सौंदर्य, नयनरम्य किनारा आणि शक्तिशाली समुद्राचा आनंद घेणे.
काळी वाळू, अल्ट्रामॅरीन महासागर, हिरवे तळवे किनाऱ्यावर आहेत आणि क्षितिजावर भव्य अगुंग उगवतात.
बालीमध्ये काळ्या वाळूचे किनारे कोठे शोधायचे?
हे करणे खूप सोपे आहे. बेटाच्या पाचशे किलोमीटरच्या किनारपट्टीपैकी ऐंशी टक्के काळ्या वाळूचे किनारे आहेत. आणि आज मी काळ्या वाळूच्या किनार्याच्या किनारपट्टीबद्दल बोलणार आहे, दहा किलोमीटर लांब, जे सनूर आणि पडंग बाईच्या वस्त्यांमध्ये स्थित आहेत.
प्रिय वाचकांनो, मी तुम्हाला आमच्यासोबत काळ्या वाळूचे किनारे पाहण्यासाठी आमंत्रित करतो. बालीमध्ये पूर्ण चंद्र बीच (पंताई पूर्णामा) सह प्रारंभ करूया, सर्व नावे प्रतीकात्मक आहेत. बेटावर पौर्णिमा आणि अमावस्या हे महत्त्वाचे दिवस आहेत. या दिवसांत, समारंभ होतात, बेटवासी स्नानासाठी पवित्र झऱ्यांवर जातात.
आणि कोणीतरी या घटकाच्या हातात वेळ घालवण्यासाठी समुद्राकडे जातो. बालीमध्ये, धबधबे, तलाव, जंगल आणि महासागर यांच्यामध्ये राहून, तुम्ही आश्रमाप्रमाणेच काही आश्चर्यकारक स्थितीत बुडता.
पुरेसं आहे फक्त तुझ्या लयीत जगणं, जे सध्याच्या घडीला उभं राहतं, तुझ्यासोबत नाचते. आणि तुमचे काम करा.
दरम्यान, आम्ही मस्केती बीचवर जात आहोत (पंताई मस्केती)

कमी भरतीच्या वेळी, समुद्रकिनाऱ्याजवळ नयनरम्य शैवाल भाग दिसतात, जेथे आकाश परावर्तित होते. माशेती बीच सुंदर, नयनरम्य आणि पूर्णपणे पर्यटन नाही. आम्हाला इथे पहाटे फिरायला यायला आवडते. स्वच्छ हवामानात, मार्गावर, आपण पवित्र बाली शिखर अगुंग पाहू शकता. आता तो ढगांच्या मागे लपला.

स्थानिक लोक आच्छादन आणि अंतर्गत सजावटीसाठी गोल दगड गोळा करतात. आणि तरीही, बाली त्याच्या साधेपणात आणि नैसर्गिकतेमध्ये विशेष आणि अद्वितीय आहे. आणि काहीतरी मी फक्त बालीमध्ये पाहू शकतो, फक्त येथे काहीतरी शक्य आहे. सामान्य, दररोज, पण म्हणून बालिनी-बालीनीज? उदाहरणार्थ, हे.



आणि आम्ही आधीच केरामस बीचवर आहोत (पंताई केरामास).


हा समुद्रकिनारा शक्तिशाली महासागराच्या लाटांनी ओळखला जातो, येथे सर्फिंग शक्य आहे. समुद्रकिनाऱ्यावर घोडेस्वारी, डॉल्फिनसह रेस्टॉरंट आणि पूलसह बीच क्लब देखील आहेत. सर्वसाधारणपणे, केरामास पायाभूत सुविधांनी समृद्ध आहे.











































No comments:
Post a Comment