Thursday, May 27, 2021

चांदवड किल्ला

  समुद्रसपाटीपासून सुमारे १००० फुट ऊंचीवर असलेले चांदवड हे शहर नाशिक पासून ६४ कि.मी. अंतरावर असून सह्याद्रीच्या रांगांच्या कुशीत व दख्खनच्या सीमेवर वसलेले आहे. हे गाव २०.२० अंश उत्तर अक्षांश आणि ७४.१६ अंशपूर्व रेखांश वर स्थित आहे .प्राचीन इतिहासाचे ठसे उराशी बाळगणारे चांदवड सातमाळ डोंगररांगेच्या कुशीत वसले आहे. शहराकडे झेपावलेल्या गावाला लाभलेला सात वेशींच्या आठवणी, किल्ल्याचा बाज अन् रंगमहालाचा साज हा वारसा अजूनही टिकून आहे. जैन लेणीपासून हनुमानाच्या हेमाडपंती मंदिरापर्यंत अन् ग्रामदैवत रेणुकामातेच्या मंदिरापासून चंद्रेश्वराच्या अख्यायिकांपर्यंत लखलखणाऱ्या आठवणी चांदवडची सफर चंदेरी करतात. फक्त गरज आहे ती या आठवणींना पर्यटनाची जोड देण्याची…
     नाशिकहून ६० किलोमीटरवर मुंबई-आग्रा रोडलगत वसलेल्या चांदवडमध्ये प्रवेश करताना सह्याद्री पर्वत श्रेणीतील सातमाळ डोंगर रांग आपल्यासोबत धावत असल्याचा अनुभव घेता येतो. उजव्या हाताचा धोडपही आपल्याबरोबर धावण्याची स्पर्धा करतो. शहरात प्रवेश करताच नजरेत भरणारा चांदवड किल्ला आपले स्वागत करतो. मुंबई-आग्रा रोडवरील घाटावर बांधलेला हा किल्ला पुणे, नाशिक, मुंबई व विदर्भात जाणारे सगळे रस्ते अडवून शत्रूची कोंडी करण्यासाठी महत्त्वपूर्ण ठरत असे. म्हणूनच चांदवडच्या किल्ल्याबाबत असे म्हटले जाते की, ‘या किल्ल्याने आपली टांग एखाद्या गोष्टीत टाकली तर ते काम कधीच पूर्ण होत नाही.’
         चांदवड म्हणजे वडाची व्याप्ती चंद्रापर्यंत गेली आहे ते चांदवड. मात्र आता वडांची संख्या खूप कमी दिसते. चांदवड नगर इ. स. ८ व्या शतकाच्या सुमारास वसले असल्याचा उल्लेख शनि महात्माच्या पोथीत आला आहे. त्यात चांदवडला ताम्रलींदापूर असे म्हटले आहे तर जैन साहित्यात चंद्रादिव्यपुरी म्हटले आहे. यादव घराण्यातील द्रढप्रहार राजाच्या काळात चांदवडला आर्थिक सुबत्ता मिळाली. या काळात चांदवडला चंद्रपूरही म्हटले गेले. तर एका अख्यायिकेनुसार अगस्ती ऋषी चांदवडमध्ये वास्तव्यास असताना त्यांना चांदवडकरांनी तूप दिले नाही म्हणून त्यांनी शाप देत ही नगरी चांडाळनगरी किंवा चांडाळपूर असल्याचे म्हटल्याने पुढे ती चांदवड म्हणून ओळखली जाऊ लागली. काष्टशिल्पांमुळे सजलेल्या चांदवडला चांदोर असेही म्हटले जायचे तर मोगलांच्या काळात चांदवडचा उल्लेख जाफराबाद असा केला गेला आहे.
     चंद्रहास राजाची चांदवड ही राजधानी होती. त्यानेच चांदवडच्या किल्ल्यावर चंद्रेश्वर महादेवाचे मंदिर बांधले. हेमांडपती बांधणी मंदिराचा जीर्णोद्धार अहिल्याबाई होळकर यांनी १७४० मध्ये केला. मंदिराच्या आजूबाजूला अनेक मंदिरे असून यात हनुमान मंदिर, सात पीरचा समावेश आहे. चंद्रेश्वर मंदिराच्या खाली तांबडका नावाच्या डोंगरकड्यावर रेणुका देवीचे पुरातन मंदिर आहे. या मंदिराचा जीर्णोद्धारही अहिल्याबाईंनी १७४०मध्ये केला. रेणुका माता ही चांदवडची ग्रामदेवता आहे. याशिवाय गणेश बारीतील गणेश मंदिर, मनोहर देवालय, तुळजाभवानी मंदिर, महादेव मंदिर, राम मंदिर, हेमाडपंथी हनुमान मंदिर, श्रीकृष्ण मंदिर, भैरवनाथ मंदिर, खंडेराव मंदिर, कार्तिकेश्वर मंदिर, जैन धर्मियांचे मेघ पार्श्वनाथ मंदिर, महावीर जैन मंदिर, काच मंदिर तर चांदवडच्या डोंगरावरील तीर्थंकर चंद्रप्रभूची लेणी प्रसिद्ध आहे. येथेच कालिका व गणपती मंदिर आहे. खंडेलवाल दिगंबर जैन मंदिरात अनेक चित्र होती. मात्र, हे मंदिर पाडून नव्याने बांधल्याने हा वारसा नष्ट झाला आहे.
            राष्ट्रकुटकालीन खान्देशचा राजा श्री शेऊणचंद्र याची उपराजधानी असलेले ‘तामलिंदापुरम्’, माहुरनिवासनी देवी रेणुकेचा भक्त यादववंशीय राजा चंद्रहास ह्याची राजधानी ‘चंद्रदिव्यपुरी’ आणि मराठयांच्या दैदिप्यमान इतिहासाची साक्ष देणार्र्या मल्हारराव होळकरांच्या सुनबाई अहिल्यादेवी होळकरांचा पदस्पर्श लाभलेले ‘चांदवड’ हे खरोखर ‘इतिहासाचे साक्षी’ आहे.
           चांदवड हे शहर अनेक शतकांचा वारसा लाभलेल्या देशभरातल्या निवडक शहरांपैकी एक आहे. म्हणुन येथे ९ व्या शतकातील राष्ट्रकुटांच्या काळातील इंद्राई , चंद्रहास राजवटीची साक्ष देणारा चांदवडचा किल्ला (चंद्राई), होळकरकालीन टाकसाळ, १८ व्या शतकाच्या वास्तुकलेचा नमुना असणारा रंगमहाल, आदि वारसास्थळे इतिहासाची आठवण करून देतांनाच अंगावर शहारे येतात. चांदवडचा महिमा वाढवणाऱ्या कार्यात ऋषी अगस्थी, महर्षी मार्कंडेय, उज्जैनाधिपती राजा विक्रमादित्य, या व अशा कित्येक महामनांच्या उपस्थितीचा ठसा उमटलेला आहे. ह्या जोडीलाच शहरात असणारी प्राचीन शिल्पकलेची साक्ष पटवून देणारी बांधकामे, प्राचीन शिलालेख, मंदिरे, ऐतिहासिक लढायांच्या खुणा मिरविणारे भग्न वाडे, पुरातन वास्तू, इ.
    राष्ट्रकुट राजा शेऊणचंद्र(१ला) ह्याने पारोळा (जि.जळगाव) येथे आपल्या राजधानीचे शहर वसविले होते. पुढे इ.स. ११६७ साली क्षत्रप राजा नहपान ह्याचा सोबतच्या तहांतर्गत क्षत्रपांचा चांदवड परगणा राष्ट्रकुटांना प्राप्त झाला. तेव्हा चांदवड हा मुख्य रहदारीचा मार्ग असल्याने त्याचे व्यापारी व येथून घाटावर नजर ठेवणे सोईचे असल्याने त्याचे सामरिक महत्व जाणून राजा शेऊणचंद्र(१ला) ह्याने चांदवडला आपले प्रमुख लष्करी केंद्र व उपराजधानीचे शहर म्हणून निवडले.
    ह्याच काळात येथे विविध देवतांची स्थापना करत तब्बल २०० हून अधिक मंदिरे उभारण्याचा आपला निश्चय राजा शेऊणचंद्राने पूर्ण केला. त्याबद्दल श्रीक्षेत्र चंद्रेश्वर येथे जी ५२ विविध मंदिरे होती, ती शेऊणचंद्राने वसविलीत का? हा यक्षप्रश्न आजही इतिहासकारांना अनुत्तरीत आहे.
    आजही तालुक्यात बर्र्याच ठिकाणी रहस्यमय वाटणारे कितीतरी मंदिरे पहावयास मिळतात. जसे, पाताळेश्वर महादेव जो गणूररोडवर एका विहिरीत विराजमान आहे. खरंच का तो पाताळेश्वर आहे?
    इ.स. ९-१० व्या शतकातील यादव राजा पन्नार ह्याची राजधानी चंद्रदिव्यापुराम् असावे. ह्याच कालावधीत येथे तेली समाजाचे प्राबल्य दिसून येते. त्याकाळी चांदवडला ४०० हून अधिक तेलाची घाणी होत्या. शनिमहात्म्यात वर्णिल्याप्रमाणे राजा विक्रमादित्य साढेसातीच्या काळात चांदवड तालुक्यतील श्रीक्षेत्र वर्दडी येथे एका व्यापार्र्याच्या घाण्यावर देखरेख करू लागला.याची कथा अशी उज्जैनचा राजा विक्रमादित्य हा शनीच्या फेऱ्यात अडकला तेव्हा तो ताम्रलिंदापूर म्हणजेच चांदवडला देवदर्शनासाठी आला होता. तेव्हा चंद्रहास राजाच्या सैन्यांनी त्याचे हात पाय तोडले. तेव्हा विक्रमादित्याला चांदवडमधील तेली समाजाने आश्रय दिला. तेव्हापासून हा समाज भरभराटीस आला. नंतर याच गावात शनी देवाने त्याला दर्शन दिले व साडेसातीतून मुक्त केले.
    रामायणकाळात अगस्ती ऋषींचे येथे वास्तव्य झाले राजा विक्रमादित्य येथे असतांना ‘चांदवडची फणी’ प्रसिद्ध होती. तिचे वेगळेपण म्हणजे ती संपूर्ण लाकडाची असुन त्यात तेल टाकण्यासाठी खाच केली होती. सोबतच येथील ‘बूट’ हे देखील फार प्रसिद्ध होते. कारण चालतांना त्यातून ‘बासरीची धून’ ऐकु यायची. गावातील साळी व क्षत्रिय समाजातील कारागीर हातमागावर आपली कला दाखवत. चांदवडची अंजीर, खवा, पेढे, प्रसिद्ध होते.





                 चंद्रहास व विक्रमादित्यांचा मोठा इतिहास चांदवडच्या स्मृतीत अजूनही ताजा आहे. इ. स. ८ ते ११ व्या शतकात चांदवडवर यादवांचे साम्राज्य होते. १६३५ मध्ये मुगलांनी चांदवडचा परिसर ताब्यात घेतला. त्यानंतर पेशवाईतील कामगिरीमुळे मल्हारराव होळकरांना चांदवड जहागिरी म्हणून मिळाले. मल्हारराव होळकरांनी चांदवडला चंदेरी बनविण्यासाठी अनेक कारागिरांना जम‌िनी व पैसा दिला व त्यांच्याकडून चांदवडचा कायापालट करून घेतला. याच काळात येथे तांब्याचा व्यवसाय बहरला. चांदवड किल्ल्यावर मल्हारराव होळकरांनी टांकसाळ सुरू केली होती. पेशवाईत चांदवडचा चांदीचा ‘चांदोरी रुपया’ प्रसिद्ध होता. १८३० मध्ये चांदवडची टांकसाळ कायमची बंद झाली. आता या टांकसाळीचे अवशेष तेवढे उरले आहेत. मल्हारराव होळकरांनंतर अहिल्यादेवी होळकर यांनी चांदवडची सूत्रे हातात घेतली. १८०० मध्ये पेशव्यांचा बदला घेण्यासाठी यशवंतराव होळकरांनी चांदवड लुटल्याचा उल्लेख पेशवाई दप्तरांमध्ये मिळतो. १८०४ मध्ये कर्नल वॉलेस याने चांदवड होळकरांकडून ताब्यात घेतला. मात्र त्यानंतर सूत्रे पुन्हा होळकरांकडे आली. १८१८ मध्ये पेशवाईचा अस्त झाल्याने सर थॉमस हिस्लॉपने पुन्हा चांदवड ताब्यात घेतले. हा संघर्ष येथेच संपला नव्हता. चांदवड किल्ल्याचे व मार्गाचे महत्त्व इंग्रज जाणून होते. लेफ्टनंट कर्नल मॅक्झ्वेल व सर जॉन माल्कम यांने अनेक हल्ल्यांना परतवीत चांदवडवर आपला कब्जा कायम ठेवला. मात्र १८५७ च्या उठावात हिंदुस्तानी फौजांच्या २६व्या तुकडीने निकराचा लढा देत चांदवडवर ताबा मिळवला; मात्र हा स्वातंत्र्य संग्राम क्षणभंगूर ठरला. इंग्रजांनी पुन्हा चांदवड ताब्यात घेतले ते स्वातंत्र्य मिळेपर्यंत
१४व्या शतकात दिल्लीची सुलतानशाही संपल्यावर चांदवड बहामनी राजवटीत गेले.
१५८०च्या काळात चांदवड मोगली राजवटीचा भाग बनले.
१६०५च्या मराठा-मोगली युद्धात चांदोरचा (चांदवडचा) ताबा मराठयांना मिळाला.
१६३५ साली मुघल शाहजादा अकबर (२रा) याने चांदोरचा परगणा जिंकला.
१६४०ला शरिफजी भोसला (शहाजीराजांचा लहान भाऊ व आदिलशाही सुभेदार) नाशिकचा सुभेदार झाला व चांदोर किल्ल्यात २ आठवडे राहिला.
१६६५ मध्ये चांदोर ‘जाफराबाद’ झाला.
१७४० साली चांदोरचा किल्ला सर करून संताजी व धनाजीने पेशवा बाजीराव बल्लाळची शाबासकी मिळवली.
देशमुखांच्या वाड्यात आता मल्हारराव राहू लागल्यावर तो १५५०-५६ काळात दुरूस्ती करून ‘रंगमहाल’ झाला. १७६८पर्यत मल्हारराव यांनी एकछत्री राज्य केले.
१७६८-९५ अहिल्यादेवींनी मुलगा मालेराव आणि पुतण्या तुकोजीराव यांच्या मदतीने राज्य सांभाळले.
    १८०४ मध्ये कर्नल वॅलेसने चांदवडचा ताबा घेतला.   
१८०९ला इंदोरच्या फौजांनी इंग्रजाची दाणादाण उडवून चांदवडचा ताबा घेतला.
    १८१८मध्ये थॅमस हिस्लापने चांदवडचा परिसर जिंकला.
१० एप्रिल १८१८मध्ये मराठासेनेने चांदवडवर हल्ला केला. पण ब्रिटीश लेफ्टनंट कर्नल मॅक्झ्वेलने हा हल्ला परतवला.
    १८२० पासून इंग्रजानी धुळे- चांदवड मार्गावर  चौक्या बसवून करवसुली सुरु केली.
    १८५७च्या उठावात २६व्या मराठा तुकडीने चांदवड शहर ताब्यात घेतले. पण १८५९च्या फितुरीने चांदवड शहर इंग्रजाकडे गेले ते १९४७मध्ये स्वतंत्र भारतातच मुक्त झाले.
       चांदवड अन् अहिल्यादेवींचा संबंध फार घनिष्ट असा होता. होळकरांना चांदवड परगणा कसा मिळाला, याचा संदर्भ 'पेशव्यांची बखर' यात पहावयास मिळतो. इ. स. १७४०-१७६१ या बाळाजी बाजीराव उर्फ नानासाहेब पेशव्यांच्या कालखंडात हा संदर्भ सापडतो. तो असा - "भाऊसाहेब नाशिक येऊन मुक्काम केला.
    नाशिक जागा पाहून सरकारची मर्जी बहूत आनंदी झाली. यासाठी काही दिवस तेथे राहिले. तेव्हा मल्हारराव होळकर यांनी सरकारात विनंती करुन चांदवड महाल आपणास मागून घेतला. चांदवड परगणा होळकर यांचे हवाली केला."
Ahilyadevi holkar in chandwad
    

Agilyabhai Holkar real painting
    

 मल्हाररावांच्या नंतर परिस्थितीमुळे होळकर घराण्याची सारी सूत्रे अहिल्यादेवींकडे आली. होळकरांच्या परगण्यांमध्ये 'चांदवड' देखील असल्याने अहिल्यादेवींचा चांदवडशी संबंध हा आला. त्या धार्मिक सहिष्णू होत्या. त्यांचा चांदवडला मुक्काम असे. चांदवडच्या माता रेणुका देवीवर त्यांची अपरंपार श्रद्धा होती. त्यामुळे रेणुका देवी मंदिराचा जीर्णोद्धार त्याला दगडी कोट, त्यावर कोरीव काम , धर्मशाळा, रेणुकातीर्थ (सरोवर), भव्य प्रवेशद्वार, दगडी पायऱ्या, देखण्या दीपमाळ इ. गोष्टी अहिल्यादेवींनी केल्या. रंगमहालातून देवीमंदिराकडे जाणारे एक भुयार आहे. असं म्हणतात की अहिल्यादेवी त्या भुयारातून देवी दर्शनासाठी जात.
Ahildabhai in Holkarwada, Rangmahal
    चांदवडला बरेच 'बारव' (विहिर) आहे. त्यामळे गावाला मोठा पाणी पुरवठा होतो. या भव्य पाय विहिरी देखील अहिल्यादेवींनी उभारल्या. आज होळकर ट्रस्ट तर्फ देवीच्या (रेणुका) मंदिराची देखभाल केली जाते. श्री रेणुका मंदिरात अहिल्यादेवींचा सुंदर अर्धाकृती पुतळा आहे. भाविक मंदिरात आल्यावर रेणुका देवीचा जयजयकार करतात. अहिल्यादेवींच्या पुतळयाला देखील प्रणिपात करतात.
Ahilyabai holkar palkhi
   आजही अहिल्यादेवीचे स्मरण म्हणून दर पौर्णिमेस व नवरात्र उत्सवात १० दिवस पालखी निघते. ही पालखी सकाळी रंगमहालातुन निघते व लोहार गल्लीतुन रेणूकादेवी मंदिरात जाते व संध्याकाळी शिंपी गल्लीतून रंगमहाल परत येते. या पालखीत अहिल्यादेवींचा फोटो व रेणुका  देवीचा सोन्याचा मुखवटा असतो. ही पालखी वाजत-गाजत निघते. पालखी उचलनारे व ढोल वाजवनारे लोक परंपरेने हे काम करत आहे. रस्त्यात प्रत्येक  घरातुन या पालखीची पुजा केली जाते.
चांदवड येथील व्यवसाय
    चांदवड व्यापारी मार्गावर असल्याने येथे अनेक उद्योग भरभराटीस आले. केस विंचरताना फणीतून तेल लावण्याचे अनोखे संशोधन येथील तेली समाजाने केले होते. फणीतच तेल टाकण्याची अनोखी पद्धती त्यांनी शोधल्याचे ग्रामस्थ सांगतात. फणीशिवाय चांदवडी जोडे, बूट, तांब्याचा व्यवसाय, अंजिरे, खवा प्रसिद्ध होता. आजही चांगल्या दर्जाचा खवा चांदवडमध्ये मिळतो. हातमाग उद्योगासाठी चांदवड प्रसिद्ध होते; मात्र हा उद्योग आता हद्दपार झाला आहे. १८९० मध्ये चांदवडची लोकसंख्या लाखभर होती; मात्र १८९६ मध्ये मानमोडीचा रोग आल्याने चांदवड वैराण झाले. चांदवडमध्ये उद्धवस्त होऊन पुन्हा उभे राहण्याची कमालीची जिद्द आहे. अनेक आक्रमणे, युद्ध व रोगांमध्ये चांदवडने दोन हात केल्याचे दिसते.
चांदवडच्या सात वेशी व वाडे
चांदवडचा खरा वारसा म्हणजे चांदवडच्या सात वेशी व वाडे. सात वेशींमध्ये दोन वेशी तग धरून आहेत. यातील देवी वेस टिकून उभी असून त्यावरही मोहक चित्रांच्या खुणा अजूनही पहायला मिळतात. मात्र तिनेही देह ठेवायला सुरुवात केली आहे. चांदवडचा हा खंदा पहारेकरी जपला जायला हवा. मात्र अनेक वाड्यांनी देह ठेवला आहे. यात अहिल्याबाई होळकर यांनी बांधलेला रंगमहाल ही चांदवडची शान आहे. १७५० ते १७६५ या पंधरा वर्षांत रंगमहाल बांधला. दरबार हॉलमध्ये रंगीत चित्रांमुळे या वाड्याला रंगमहाल हे नाव पडले. निसर्ग, पक्षी, प्राणी, महिला, पुरुष, मुले, राज्यकारभार आदींच्या चित्रांनी रंगमहाल सजला होता. मात्र अनेक चित्रे नाहीशी झाली असून असलेल्या चित्रांचे संवर्धन होण्याची गरज आहे. भव्य रंगमहालाला काष्टशिल्पाचे कोंदण लाभले आहे. त्यामुळे हा अनोखा वाटतो. रंगमहालातील विहीरही अनोखी आहे. राज्य पुरातत्त्व खात्याकडून रंगमहालाला नवे रूप देण्याचे प्रयत्न सुरू केले आहेत. मात्र, चांदवडकरांनी चंदेरी चांदवडचा वारसा जपण्यासाठी झटले पाहिजे, याला पर्यटनाची जोड मिळाली तर चंद्रादिव्यपुरीला पुनर्वैभव लाभेल.
       चांदवड परिसराचा इतिहास जाणून घेतल्यावर आपण आधी चांदवड गडाची माहिती घेउया आणि नंतर परिसरातील इतर ठिकाणांची माहिती घेउया.
गडाच्या इतिहासाबद्दल- 
   चांदवड किल्ला कधी बांधला हे अज्ञात आहे परंतु  नांदगाव येथे सापडलेल्या चालुक्य नरेश चांद्रदित्य उर्फ नागवर्धन (इ.स ६५०) यांच्या ताम्रपटात चंद्रादित्यपुर म्हणजेच चांदवड चा उल्लेख आढळतो.अशी पण आख्यायिका आहे कि अगस्ती मुनींचा आश्रम चांदवड गावाजवळील डोंगराजवळ होता एकदा त्यांना भूक लागली म्हणून त्यांनी चार रोडगे भाजले आणि  त्यावर तूप मागण्यासाठी ते गावात गेले परंतु कोणी तूप न दिल्याने त्यांनी ह्या नगरीला चांडाळ नगरी नाव दिले त्याचेच पुढे अपभ्रंश होऊन चांदवड असे नाव झाले.तसेच मुनींनी ४ रोडग्यांपैकी अर्धा रोडगा गाईला दिला आणि साडेतीन बाकीचे तिथेच सोडून दिले म्हणूनच चांदवड किल्ल्यासमोर असलेल्या डोंगराला साडेतीन रोडग्याचा डोंगर असे नाव पडले.
    याविषयी आणखी एक अख्यायिका म्हणजे इथे असलेल्या वडांच्या झाडाची ख्याती चंद्रापर्यंत पोचलेली आहे, असे चांदवड. चांडाळपूर, चंद्रपूर आणि चांदवड काही म्हणा, पण या गावचा आणि चंद्राचा काही संबंध आहे नक्की, कारण इथल्या डोंगरावर असलेले चंद्रेश्वराचे मंदिर.
    आणखी महत्वाचा ऐतिहासिक उल्लेख येतो तो १६३६ साली अलावर्दीखान ह्याने चांदवड परिसरातील बहुतांश किल्ले घेतले त्यामध्ये चांदवड किल्ला हि घेतला आणि इंद्राई आणि राजधेर ला कोरलेल्या शिलालेखांप्रमाणेच चांदवड किल्ल्यावर पण समान मजकुराचा शिलालेख कोरलेला आढळतो. इसवी सन १६७० ला दुसऱ्यांदा सुरत लुटल्यानंतर कांचन बारी मध्ये महाराज व दाउद खानामध्ये  जी लढाई झाली त्या लढाईची तयारी दाऊद खानाने चांदवड किल्ल्यावर केल्याचे उल्लेख आढळतात.तसेच १६८२ मध्ये संभाजी महाराजांच्या एका तुकडीने चांदवड किल्ल्यावर हल्ला केल्याचा उल्लेख सापडतो मात्र हल्ल्यानंतर काय झाले ते काही उमगत नाही.
      पुढे पेशवाईत ह्या किल्ल्याचा तुरुंग म्हणून वापर होई.ह्या किल्ल्यावरची सर्वात महत्वाची वास्तू  म्हणजे किल्ल्यावरील टांकसाळ!!. फार कमी किल्ल्यांवरती टांकसाळ असल्याचे ऐकण्यात येते.नानासाहेब पेशव्यांनी हा किल्ला होळकरांना दिला आणि पुढे माधवराव पेशव्यांनी चांदोरी रुपयांची टांकसाळ सुरु केली.पुढे काही मतभेदांमुळे ए.स १८०० मध्ये हि टांकसाळ चांदवड गावात हलवण्यात आली. १८०४ साली कर्नल वॉलेस याने चांदवडचा किल्ला जिंकून  घेतला परंतु तो किल्ला लगेचच होळकरांच्या ताब्यात देण्यात आला. इसवी सण १८१८ मध्ये थॉमस हिस्लॉप याने हा किल्ला जिंकून घेतला आणि  १८२९ मध्ये चांदवड टांकसाळीतील चांदीच्या रुपयाची नाणी पाडण्याचे काम बंद करण्यात आले.१८३० मध्ये तांब्याची नाणी पाडण्याचे काम पण  थांबवण्यात आले आणि त्यानंतर टांकसाळ बंद करण्यात आली.  
चांदवड गडाची माहिती :-
    रेणुका मंदिरापासून चांदवड किल्ल्याचा डोंगर आपल्याला समोरच दिसतो.मंदिरापासून चांदवड किल्ला लांब नाही.आणि ह्या भागात किल्ल्याच्या पायथ्याशी असलेल्या चंद्रेश्वर महादेव मंदिरामुळे वर्दळ असते त्यामुळे गाडीरस्ता हि व्यवस्थित पायथ्यापर्यंत जातो.

                                                              रेणुका माता चांदवड

                                                                     मंदिर परिसर

रेणुकामातेच्या मंदीराकडे वळालो.. आता जिर्णोद्धार झाला असला तरी मंदीरासमोर उभी असणारी दिपमाळ व मंदीराचे किल्लेसदृश असणारे प्रवेशद्वार त्या काळाची आठवण करून देते.. ह्या मंदीराचा गाभारा म्हणजे डोंगरातील गुहाच आहे.. ह्याच मंदीराला खेटून चांदवड किल्ला दिमाखात उभा दिसला.. ह्या किल्ल्याच्या डोंगराला लागूनच एका टेकाडावरती 'चंद्रेश्वर'चे शुभ्र पांढर्‍या रंगाचे मंदीर बांधलेले दिसते.. इथला परिसर पावसात अगदी खुलतो. अगदी प्रसन्न मुद्रा असणार्‍या रेणुकामातेचे  दर्शन घ्यायचे आणि चांदवड किल्ल्याकडे निघायचे..

मंदीराचे प्रवेशद्वार

- -

- -
मंदीरातील माहितीफलक

पायथ्याला पोहोचल्यावर चंद्रेश्वर मंदिर लागते. मंदिर हे तसे पुरातन आहे हे  नीट न्याहाळल्यावर कळते.मंदिराच्या आवारात एक उत्कृष्ट वीरगळ बघायला मिळते तसेच अनेक  पुरातन अवशेष विखुरुन ठेवलेले दिसतात. मंदिरावर अप्रतिम असे कोरीव काम आणि शिल्पकाम केले आहे.परंतु दुर्दैवाने मंदिराला बाहेरून डिस्टम्पर कलर आणि आतून ऑइलपेंट दिल्याने त्याची सर्व शान लयाला गेलीय. मंदिर पाहून पुढे गेल्यावर खरी चांदवड किल्ल्याकडे वाटचाल सुरु होते.सर्वप्रथम एक दगडी भिंत लागते ह्या भिंतीवर ३ गणेश शिल्प कोरली आहेत त्यातल्या दोन  गणपतींना शेंदूर फासला आहे.भिंतीला लोखंडी दरवाजा आहे व आत कातळ गुहा आहे. बाहेर एक छोटे पाण्याचे टाके आहे.हे पाहून पुढे गेल्यावर बांधिव गोल दगडी तलाव लागतो .तलावाच्या डावीकडे एक मोठी समाधी आहे आणि त्याच्या  बाजूला दगडी चौथऱ्यावर ७ थडगे बांधले आहेत.ह्या थडगी आणि समाधीं  बद्दल माहिती मात्र उपलब्ध नाही.

                                                     दगडी भिंत आणि गणेश शिल्प
                                                                     समाधी       

                                                                           ७ थडगी

                                                                       चंद्रेश्वर मंदिर

                                                    चंद्रेश्वर मंदिराच्या आवारातील वीरगळ

                                                चंद्रेश्वर मंदिराच्या आवारातील वीरगळ मागचा भाग

थडगी पाहून सरळ गडाच्या चढाईस सुरुवात करावी ,चांदवडला डोंगरावर जिथे चंद्रेश्वराचे मंदिर आहे तो पठाराचा सगळा भाग ही चांदवडच्या किल्ल्याची माची. या माचीवर जायला आता चंद्रेश्वर मंदिरापर्यंत सरळ गाड्यांसाठी डांबरी रस्ता आहे. याच रस्त्याने आपण वाटेत असणाऱ्या तलावापर्यंत जायचे. तलावाजवळ गाडी लावायची आणि चांदवडच्या कातळकड्याकडे निघायचे. आपण उभे असलेले पठार, पुढे थोडासा चढ, मग परत बहुतेक सपाटी, परत थोडा चढ सरळ कातळाला जाउन भिडलेला आणि पुढे अभेद्य काळाकभिन्न कडा. सरळ चढायला सुरुवात करायची. एका दमात सगळे चढ चढून वरच्या छोट्या पठारावर वीस मिनिटात पोहचतो.

    चढाईच्या मध्यात आपल्याला टाकसाळीचे अवशेष पाहायला मिळतात आणि हि टाकसाळ किल्ल्याच्या डाव्या बाजूला मध्यावर आहे. त्यामुळे चढाई डाव्या बाजूने चालू ठेवावी टाकसाळीच्या दिशेने. साधारण २० ते २५ मिनिटांत आपण टाकसाळीच्या ठिकाणी पोहोचतो.   

टांकसाळ आणि मागे चांदवड किल्ला

समोरच एक मोठा वाड्याचा भक्कम चौथरा, खुपशा ढासळलेल्या पण त्यातही काही तग धरून असलेल्या भिंती, त्यातच मजबूत बांधणीची दरवाजाची कमान असे एका मोठ्या इमारतीचे अवशेष दिसतात. हीच ती चांदवडची प्रसिद्ध टांकसाळ! फार कमी किल्ल्यांवर टाकसाळी असण्याचे उल्लेख आढळतात.सध्याच्या घडीला टाकसाळीचे चौथरे व एक उध्वस्थ प्रवेशद्वार व तिन्ही बाजूचे  छप्परवजा अवशेष बाकी आहेत.टाकसाळीचे बांधकाम शिवकालीन दगडी घडणीचे आहे परंतु मधेच पेशवेकालीन विटांचे पण पाहायला मिळते. ह्याचा अर्थ वेळोवेळी टांकसाळीची डागडुजी केलेली दिसते.ही टांकसाळ इसवी सन १७७२ मध्ये थोरल्या माधवराव पेशवे यांच्या आज्ञेने तुकोजी होळकर यांच्या कारकीर्दीत सुरू करण्यात आली. त्यात शुद्ध चांदीचा “चांदोरी” रुपया पाडला जात असे त्याला “चांदवडी तुर्रा” म्हटले जाते. हा रुपया अगदी पेशवाई नंतरच्या कालखंडातही वापरात होता. तो त्या टांकसाळेत दरमहा एक लाख एवढ्या प्रमाणात पाडण्यात येत असे. टांकसाळ ही या किल्ल्याची एक ओळखच. टांकसाळी सगळीकडे बांधल्या जात नसत, त्यामुळे हिचे वर्णन न चुकता करणे गरजेचे ठरते. तर ही टांकसाळ बराच वेळ खर्चून पाहून घेतली. काही भाग भाजीव विटांत, तर काही दगडात बांधून काढलेला आहे. या इमारतीत खूप खोल्या असाव्यात, तसेच दरवाजे आणि खिडक्याही.

खूपशा किल्ल्यांवर गुप्तधनाच्या आशेने लोकांनी प्रचंड खोदाखोद करून ठेवलेली आहेच, ही इमारत म्हणजे तर चक्क टांकसाळ. साक्षात नाणी पाडण्याचा कारखानाच! इथे तर खोदकाम म्हणजे विचारता सोय नाही, जागोजागी खोदकाम...  चक्क भुयारं वाटावीत एवढाले मोठे खड्डे करून ठेवलंनी आहेत. जमीन तर सोडाच, भिंतीही उकरून ठेवलंनी आहेत.टाकसाळ पाहून पुन्हा आपला मार्ग उजवीकडे ठेवून चालत राहायचे.ह्या मार्गाने आपण किल्ल्यावरील गडमाथ्याच्या कड्याखाली पोहोचतो जेथे एक भक्कम बुरुज आहे व त्याखाली तटबंदीचे दगड विखरुन पडलेले दिसतात.वाटेत काही खोदीव पायऱ्या हि पाहायला मिळतात.

                                             पायथ्यापासून दिसणारा चांदवड किल्ला

                                                          किल्ल्यावरील टाकसाळ

                                                          किल्ल्यावरील टाकसाळ प्रवेशद्वार

डावीकडे शिडीमध्ये वरती शिलालेख आणि उजवीकडे गुहा आणि टाके

टांकसाळ मागे ठेवून कातळकड्याकडे निघायचे जिथून गडावर प्रवेश करायचा तो टप्पा गडाच्या उजव्या बाजूला आहे, त्यामुळे थोडे उजव्या हाताने चालत, वाटेत अजून बरेच वाड्याचे अवशेष पहात त्याच्या बरोबर खाली येऊन पोहचतो. इथे काही गुहा आहेत. किल्ल्यावरील बुरुज अजूनहि सुस्थितीत आहे.बुरुजावरून पुढे गेल्यावर आपण किल्ल्याच्या कातळ कड्याखाली येतो.येथून किल्ल्यावर जाण्यासाठी  १५ फुटी  लोखंडी शिडी आणि रोप लावलेला आहे. परंतु प्रत्येकाने आपला रोप लावावा व प्रस्तरारोहणाची माहिती असल्यासच जावे.शिडीच्या उजव्या  बाजूला पाहिल्यास इंग्रजांनी त्यांच्या शिरस्त्याप्रमाणे किल्ल्याच्या पायऱ्या उध्वस्थ केल्याचे स्पष्ट दिसते. पायऱ्यांच्या  बाजूची गुहा जी सध्या बुजली आहे त्याच बरोबर पायरी मार्गात बांधलेला कोनाडा हे पायऱ्या मार्ग असल्याची साक्ष आजही देतात.कातळटप्पा चढण्यासाठी लावलेली शिडी लोखंडी असली तरी ती तकलादू आहे तिच्या आजूबाजूला दगडं ठेवून उभी  केली आहे. तसा हा पॅच लहान आहे व सहज जाण्याजोगा आहे तरीही अडचण येऊ शकते म्हणून साहित्य आणि माहितगार माणसे जवळ असल्यासच जावे. शिडीच्या अथवा प्रवेशद्वाराच्या जवळ इंद्राई आणि राजधेर किल्ल्याप्रमाणे समान मजकुराचा फारसी शिलालेख पाहायला मिळतो. शिडीच्या उजव्या बाजूला फ़ारसी शिलालेख आहे. त्यात "इसवीसन १६३६ मध्ये शहाजहान बादशहाचा सेवक अलीवर्दी खान याने हा किल्ला जिंकून घेतलेला आहे", असे कोरलेले आहे. 

                                                                          खोदीव पायऱ्या

                                                                              बुरुज
 

                                      शिडीच्या उजव्या बाजूकडील पायरी मार्गाची साक्ष देणारा शिलालेख

 हा टप्पा चढून गेल्यावर गडावर जायचा मार्ग, म्हणजे आपण ज्याने जाणारे तो सध्याचा मार्ग, दिसायला लागतो. कारण गडाचा हा मूळ प्रवेशमार्ग नाही. तो अजून उजव्या बाजूला, साधारण शिलालेख पहिला त्या बाजूला आहे, जो इंग्रजांनी पेशवाई संपल्यानंतर किल्ल्यांची जी नासाधून चालवलंनी, त्यात उध्वस्थ केला.

चांदवड कातळटप्पा

कातळटप्पा चढून गेल्यावर पायर्‍या आहेत. या पायर्‍यावर शरभ शिल्प आहे. 

                                                                       प्रवेशद्वार(छायाचित्र:वरून देवरे )

पायर्‍या चढून गेल्यावर पश्चिमाभिमुख उध्वस्त प्रवेशव्दार आहे. 

सध्याच्या प्रवेशमार्गावरच्या पायऱ्या आणि जवळचे टाके.

प्रवेशव्दारातून आत आल्यावर समोरच पाण्याचे टाके आहे.कातळकोरीव पायऱ्या जिथे दिसतात, तिथे उजव्या बाजूला गुहा आहेत. त्या पहारेकर्‍यांच्या देवड्या असाव्यात. 
उतारावरचे लपलेले खांब टाके

तर डावीकडे एक पाण्याचे टाके दिसते.प्रदक्षिणा मार्गाने गडफेरीस सुरुवात करायची. कातळात खालच्या बाजूला बऱ्यापैकी बुजत आलेलं पाण्याचे टाकं दिसत. जवळच खालच्या बाजूला एक खांब टाकं आहे, यातलं पाणी पिण्यायोग्य नाही. थोड्या वरच्या बाजूस असलेल्या जोड टाक्यातील पाणी मात्र पिण्यायोग्य वाटलं. इथे जवळच एक गोमुख ठेवलेले आहे. तिकडे डाव्या हातास एक बुरूज आहे त्याला ढालकिणीचा बुरूज म्हणतात.
जोडटाके

 पायर्‍या चढून गेल्यावर आपण थोड्या सपाटीवर येतो. आपल्याला येथे चौथरा आणि वाड्याचे अवशेष दिसतात.

                                                                         छोटा तलाव (छायाचित्र:वरून देवरे )

इथून पुढे चालत गेल्यावर छोटेखानी पाण्याचा तलाव पाहायला मिळतो.पुढे वाड्याचे उध्वस्थ अवशेष आणि काही वास्तूंचे चौथरे पाहायला मिळतात.ह्याव्यतिरिक्त पाण्याची इतर टाकी आणि इतस्ततः  विखुरलेले अवशेष पाहायला मिळतात.

डोळ्यांना सुखावणारा हिरवागार तलाव

तिथेच राजवाड्याचा चौथरा आहे. बऱ्यापैकी उध्वस्त असलेला हा चौथरा आहे. दगडी खांबांचे नक्षीदार दगड इतस्ततः पसरलेले दिसतात. एक गोलाकार भोक असलेला एक भग्न दगडही इथे दिसतो. तिथे हिरव्यागार पाण्याचे तळे दिसले, त्यात बाजूबाजूने खूप शेवाळे धरलेले आहे. हे अवशेष पाहून किल्ल्याच्या पूर्व टोकाकडे चालत जातांना वाटेत उध्वस्त घरांचे चौथरे दिसतात. चौथरे पाहून मागे वळून गडमाथ्यावर चालत जावे. याठिकाणी पाण्याचा मोठा तलाव आहे. तलाव पाहून खाली उतरल्यावर आपण प्रवेशव्दारा पुढील टाक्याजवळ पोहोचतो. हे पाहून जिथे प्रवेशद्वाराजवळच्या  पायऱ्या उध्वस्थ केल्या आहेत त्या भागाच्या वरील बाजूस आपण पोहोचतो  

                            गडफेरी संपण्याच्या मार्गावरील खोदीव पायऱ्या (छायाचित्र:वरून देवरे )

ह्या ठिकाणी  खोदीव पायऱ्या कोरल्या आहेत. इथे आपली गडफेरी संपते.

खांबटाक्यात डोकावून निरीक्षण करणारा आमच्या सह्यमित्र
सुंदर दृष्य चांदवड वरून

इथून जो लांबवरचा परिसर दिसतो तो काय वर्णू? आपण ज्या बाजूने गडावर प्रवेश केला त्या बाजूला तर अप्रतिम दृश्य दिसले. समोरच साडेतीन रोडग्यांचे डोंगर, त्याच्या डाव्या बाजूला आपल्याला खालपासून वर येतानाच खुणावत असलेल्या एक डोंगर, ज्याच्या टोकावर एक शिवमंदिर आहे. हे रासलिंग महादेव मंदिर. साडेतीन रोडग्यांच्यामागे अजस्त्र पसरलेला इंद्राईच्या किल्ला, त्याच्या उजवीकडून डोकावणारा राजधेर, कोळधेर मात्र इंद्राईच्या मागे लपलेला असल्याने तो दिसला नाही. फक्त त्याच दिशेला नव्हे तर चहूबाजूला अत्यंत अप्रतिम दृश्य आम्हाला दिसले. टेहळणीच्या दृष्टीने तर हा किल्ला अगदी मोक्याच्या जागी होता.. वाटेत एक अजून कातळकोरीव खांब टाके लागले. पाणी तरी इतकेच थंडगार आणि अप्रतिम!

चांदवड वरून टांकसाळ आणि मागे सुंदर दृष्य

रेणुका देवी चांदवड (Renuka Mata Mandir)

Renuka mata

निसर्गाचा वरदहस्त लाभलेल्या चांदवडची ओळख श्री रेणुकादेवी मंदिर या एतिहासिक वास्तू शिवाय अपूर्णच आहे,चांदवड शहराच्या उत्तरेला मुंबई-आग्रा महामार्गावर १ ते १.५ किमी वर तांबकडा डोंगराच्या कुशीत गुहा सद्रृश भागात रेणुका आईचे आकर्षक असे मंदिर आहे.मंदिराच्या कळसाला लागूनच जुना मुंबई-आग्रा महामार्ग जात होता आता मंदिराचा आणि भाविकांचा विचार करूनच नवीन महामार्ग डोंगर खोदून तयार केला आहे.

रेणुकादेवीचे स्थान चांदवडला कसे स्थापन झाले याची एक आख्यायिका सांगितली जाते ती अशी-

रेणुका ही माहूरगडावर आश्रम असलेल्या जमदग्नी नावाच्या अतिशय कोपिष्ट ऋषींची पत्नी. परशुराम हा जमदग्नी आणि रेणुकेचा पुत्र. तो परमपितृभक्त होता. रेणुका पतिव्रता होती, ती रोज पतीचे पाय धुण्यासाठी नदीवरून पैठणीतून पाणी आणायची, एवढे तिचे पावित्र्य कठोर होते. एकदा ती नेहमीप्रमाणे नदीवर पाणी आणायला गेली असता तिथे जलक्रीडा करणारा राजा व त्याच्या स्त्रियांना पाहून तिच्या मनांत कामवासना जागृत झाली. तिला नदीवरून घरी येण्यास उशीर झाला. जमदग्नींची देवपूजा खोळंबून राहिली. रेणुकेच्या उशिरा येण्याचे कारण लक्षात येताच त्या कोपिष्ट ऋषींच्या रागाचा पारा चढला. रागाच्या भरातच दाराशी आलेल्या आपल्या पत्नीचे म्हणजेच रेणुकेचे मस्तक धडावेगळे करण्याची आज्ञा त्यांनी आपल्या मुलाला, परशुरामाला दिली.

परशुराम परमपितृभक्त होता. वडिलांच्या तोंडून शब्द निघताच त्याने परशु सरसावला आणि एका घावातच आपल्या मातेचे मस्तक धडावेगळे केले. रेणुकेचे मस्तक तिथून जे उडाले ते चांदवडला सध्या जिथे देवीचे मंदिर आहे तिथे येऊन पडले आणि धड माहूर येथेच राहिले. तेव्हापासून माहूर आणि चांदवड येथे रेणुकेची स्थापना झाली. आजही माहूरला रेणुकादेवीच्या फक्त पादुका, तर चांदवडला फक्त मस्तक पाहायला मिळते.

दररोज त्रिविध रुपांत दर्शन

रेणुकादेवीचे मंदिर आग्रारोडला लागूनच आहे. मंदिर डोंगरात कोरलेले आहे. खरं तर ती एक गुहाच आहे. अहिल्यादेवी होळकर यांनी या मंदिराचा जीर्णोद्धार केला. आग्रारोड चांदवडच्या ज्या डोंगरावरून पुढे मालेगावकडे जातो त्याच्या खालीच ही मंदिराची गुहा आहे. मंदिराचा कळस आग्रारोडवरच आहे.

चांदवडची रेणुकादेवी स्वयंभू असून, मूर्ती पाषाणाची आहे. रेणुकामातेची मूर्ती मनुष्याकृती नसून, तिथे एक तांदळा आहे. शेंदूरचर्चित शिळेचा भाग म्हणजे देवीचे शिर होय. त्याला डोळे, नाक, तोंड आहेत, तसेच नथ व मुकुट घातलेले असतात. रेणुकादेवीलाच कर्नाटकात ‘यल्लमा’, तर महाराष्ट्रात ‘यमाई आणि ‘एकवीरा’ असेही म्हणतात. या देवीचे वैशिष्ट्य असे सांगतात, की गडावरच्या सप्तशृंगनिवासिनी देवीप्रमाणेच ती सकाळी बाला, दुपारी तरुणी, तर सायंकाळी वृद्धेप्रमाणे दररोज त्रिविध रूपांत दिसते. देवीचे दर्शन घेऊन बाहेर आल्यावर डाव्या बाजूला ज्या ठिकाणी नंदी, पादुका, नाग वगैरेंच्या दगडी प्रतिमा आहेत तिथेच भुयाराचे बंद केलेले दार आहे, असे सांगितले जाते. यावर्षी पुरातत्त्व विभागाकडून मंदिर परिसरात सुधारणा करण्यात आली आहे. मंदिराचे दरवाजे व गाभारा मोठा करण्यात आल्याने भाविकांना मंदिरात प्रवेश करणे सुलभ झाले आहे. दर वर्षीप्रमाणे यावर्षीदेखील हजारहून अधिक महिला देवी मंदिरात घटी बसल्या आहेत. त्यांच्यासाठी चार प्रशस्त हॉल उपलब्ध करण्यात आले आहेत. नवरात्रोत्सवास येणाऱ्या भाविकांसाठी संस्थानतर्फे पिण्याचे पाणी, दर्शनरांगेत भाविकांना बसण्यासाठी बेंचेस, गर्दीवर नियंत्रण ठेवण्यासाठी सीसीटीव्ही यंत्रणा, दर्शनासाठी दोन स्वतंत्र जिने इत्यादी सुविधा उपलब्ध करण्यात आल्या आहेत

    इसवी सन १७४० च्या आसपास महाराणी अहिल्यादेवी होळकर यांनी या मंदिराचा जीर्णोद्धार केल्याचे समजते.शहराकडून मंदिराकडे जाताना महामार्गालगत एक छोटासा रस्ता लागतो त्या रस्त्याने मंदिराला जाण्यासाठी जुन्या दगडी पायर्‍या आहेत,त्या पायर्‍या चढून गेल्यावर मंदिराचे भव्य असे दगडी प्रवेशद्वार आहे. महामार्गावरून दिसणारे हे दगडी भव्य प्रवेशद्वार म्हणजेच चांदवडच्या ऐतिहासिक वैभवाची साक्ष आहे.पावसात तर प्रवेशद्वारातून आणि दगडी पायऱ्यांवरून खाली खळखळणारे पाणी मन मोहवून टाकते. प्रवेशद्वारातून आत गेल्यावर प्रशस्त पटांगण आणि भव्य मंदिर समोर दिसते.पटांगणात उंचच उंच अशा दोन भव्य दगडी दीपमाळा आपल्या स्वागतासाठी तयार असतात.मंदिराचे आवार खुप छान सुशोभित केले आहे.तिथुनच चंद्रेश्वर गडावरी चंद्रेश्वर महादेवांचे सुंदर मंदिर दिसते. प्रवेशद्वारा लागुनच एका बाजूला नव्याने दोन भक्त निवास बांधलेले आहेत आणि दुसर्या बाजूला दुकानां साठी व्यवस्था आहे. मंदिरात प्रवेश केल्यावर चारी बाजूंनी दगडी बांधकाम केलेल्या धर्मशाळा बांधल्या आहेत.मंदिराच्या छतावर कोरलेल्या चार-पाच शिलालेखांवरून असे वाटते की या धर्मशाळा १७७२ मध्ये बांधलेल्या असाव्यात.धर्मशाळांच्यामध्ये आणि गाभाऱ्याच्या अगदी समोरच त्रिशूळ आणि तुळशी वृंदावन आहे.गाभार्‍याच्या पूर्वेस पडवीत नंदी, महादेवाची पिंड, संगमरवरी छोटी देवी, पादुका, मारुती व माय देवीचा भव्य मुखवटा आहे.देवीचा मुख्य गाभारा तांबकडा कोरून बनवलेला आहे.

       चांदवड करांच्या अभिमानात भर घालणारी एक गोष्ट ती म्हणजे नवरात्रातील नऊ दिवस असणारी देवीची मोठी यात्रा. नवरात्र आणि चैत्र पौर्णिमेच्या दिवशी सुद्धा भावीक धुळे ,जळगाव ,नाशिक जिल्ह्यासह अन्य जिल्ह्यांमधून  सुद्धा मोठ्या संख्येने देवीच्या दर्शनासाठी येत असतात .नवरात्रात नऊ दिवस येथे घटस्थापना केली जाते. यात्रेत प्रचंड गर्दी असते, मिठाईची दुकाने खेळणी वगैरे दुकाने असून सुद्धा यात्रेचे विशेष आकर्षण म्हणजे रहाट पाळणे वगैरे इत्यादी असतात.रात्रीच्या वेळी होणाऱ्या रोषणाई मुळे यात्रा अधिकच खुलून दिसते.अनेक भाविक दुर दुरुन नवस फेडण्यासाठी येत असतात.

     पुण्यश्लोक आहिल्यादेवी यासुद्धा रेणुकादेवीच्या प्रमुख उपासक होत्या रेणुका देवीच्या दर्शनासाठी अहिल्यादेवी भुयारी मार्गाने जात असे.आजही रंग महालातून देवी मंदिरापर्यंत जाण्यासाठी भुयारी मार्ग असल्याचे सांगितले जाते.परंतु सुरक्षेच्या दृष्टीने हे आता बंद केलेले आहे.देवीच्या मंदिरात जेथें ठेवलेला आहे त्याखाली हा भुयारी मार्ग असल्याचे सांगितले जाते.देवीच्या मंदिरात जेथें ठेवलेला आहे त्याखाली हा भुयारी मार्ग असल्याचे सांगितले जाते.त्या पालखीमधून रंग महालात असलेला देवीचा सोन्याचा मुखवटा इतर अनेक सोन्या-चांदीचे ,मोत्यांचे अलंकार व महावस्त्र मिरवुन देवीला नेले जातात व परत आणून रंग महालात ठेवले जातात.तसेच दसऱ्याच्या दिवशी रेणुका देवीची पालखी सीमोल्लंघनासाठी गावाबाहेर असलेल्या खंडेराव मंदिरात नेले जाते.ही सर्व व्यवस्था ,रंगमहाल व मंदिराची देखभाल होळकर ट्रस्टतर्फे केली जाते.

     जागृत असलेल्या रेणुका देवीचे रूप दिवसातून तीन वेळा बदललेले स्पष्टपणे दिसून येते प्रात:काळी बाला , मध्यांन्ही युवा आणि सायंकाळी वृध्दा अशी दिवसातली तीन रूपे देवीचा मुखवट्या वर स्पष्ट दिसतात, अशा उत्कृष्ट मूर्तींचे सौंदर्य बघण्यासाठी एकवेळ अवश्य भेट द्या ह्या चांदवड नगरीला.

चंद्रेश्वर महादेव मंदिर (Chandreshwar Chandwad)

   चांदवड गावाच्या उत्तरेला तांबकडा परिसरात एका डोंगरकड्यावर श्री  चंद्रेश्वर महादेवाचे पुरातन स्थान आहे. श्री चंद्रेश्वर महादेव मंदिर डोंगराच्या कुशीत वसलेले अतिशय नयन रम्य असे ठिकाण बाबराने हे मंदिर पाडल्यानंतर पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांनी या मंदिराचा उद्धार केला त्रेतायुगात वनवासात असतांना प्रभू रामचंद्रांनी या नागरी वरून प्रयाण केले. चंद्रेश्वर परिसरातून जातांना त्यांना तहान लागली. पाणी नसल्याने त्यांनी पाण्यासाठी जमिनीत बाण मारला. जमिनीतून पाणी निघाले. ती जागा म्हणजे ह्या मंदिरा जवळील गणेश टाके होय. हे पाणी कधीही आटले आसे स्थानिक लोकांना आठवत नाही. चंद्रेश्वराच्या डोंगरावरून सूर्यास्ताचे नयनरम्य दृश्य पाहताना मन हरखून जाते 


        त्या स्थानाचा महिमा असा आहे की, भोज राजा विक्रम ह्याची श्री शनिदेवांच्या वक्रदृष्टीतून मुक्तता झाल्यावर चांदवडचा राजा चंद्रसेन ह्याने आपली मुलगी चंद्र्कलेचा विवाह राजा विक्रमाशी ह्याच गडावर लावून दिला व ५२ मंदिरांची स्थापना केली. पण मुगलांच्या हल्ल्यात हा परिसर नष्ट झाला व नंतर ह्या परिसराला ग्रहण लागले. 

      त्यानंतर येथे चंद्रेश्वरचे पहिले महाराज श्री दयानंद स्वामी आले. त्यांना ह्या जागेचा स्वप्नांत दृष्टांत आल्याचे म्हणतात. आज जेथे मंदिर आहे तो भाग शेणामातीने भरलेला होता. बाबांनी तो स्वच्छ करून तेथे श्री शंभूची पुनर्स्थापना केली. आजही चंद्रेश्वरला मुख्य मंदिरासमोर स्वामी दयानंदांची समाधी व श्री सप्तशृंगी देवीचे मंदिर आहे.

Chaughada from 14th century

येथे भग्नावस्थेतला १७ व्या शतकातला चौघडा बघायला मिळतो.

    महाराज दयानंदानंतर श्री विद्यानंद ह्यांनी ती ५२ मंदिरे बांधण्याचा संकल्प सोडला, काही मंदिरे बांधलीसुद्धा;पण संकल्प अपूर्णच राहिला व स्वामींना देवाज्ञा झाली.त्यानंतर तिसरे चंद्रेश्वर बाबा श्री बंसिपुरीजी महाराज,चौथे श्री दयालपुरीजी महाराज ह्यांनी परिसरात भरपूर सुविधा केल्यात.सध्या जयदेवपुरीजी महाराज मंदिराचा कारभार बघतात. मंदिराचे सर्वाधिकार ‘श्री संस्थान महामंडलेश्वर,हरिद्वार’ यांच्याकडे आहेत.

     चंद्रेश्वर मंदिर हे अतिशय सुबकरीत्या कोरलेल्या कलात्मक मुर्त्यांमुळे आकर्षक दिसते. सभामंडपात कोरीव कामाचा उत्तम नमुना असणारा नंदी लक्ष वेधून घेतो. गाभाऱ्यातील सुबक शिवलिंग मनोरम आहे. थोडे पुढे गेल्यावर ‘गणेश टाके’ आहे.टाक्यातले थंडगार पाणी पिल्यावर सारा थकवा नाहीसा होतो.बारमाही पाणी हे या गणेश टाकीचे वैशिष्ट्य आहे. दर सोमवार, श्रावणी सोमवार, संपूर्ण श्रावण महिना, महाशिवरात्री,हरिहर भेट, कोजागिरी पौर्णिमा,स्वामी दयानंदांची पुण्यतिथी,व अन्य धार्मिक कार्यक्रम मोठ्या उत्साहात साजरे होतात.तसेच उत्सावात गावातून पालखी निघते.पालखीत भगवान शिवाचा चांदीचा  मुखवटा,शेषनाग,बाबांची,प्रतिमा,दागिने,ठेवतात. यावेळी सुवासिनी चंद्रेश्वराची पूजा करतात.श्रावणात १ लक्ष बिल्वदले ‘ओम नम: शिवाय’ या जपाने शिवलिंगावर वाहतात. तीर्थक्षेत्रावरून आणलेल्या पाण्याच्या कावडी महाभिषेकाच्या वेळी शिवलिंगावर अर्पण करतात.श्रावण समाप्तीला महाप्रसादाचा व सत्यनारायणाचा कार्यक्रम होतो.आज श्री जयदेवपुरीजी महाराजांमुळे परिसरातील भेकड गायींची गोशाळा,मंदिरात जाण्यासाठी कौन्क्रीटच्या पायऱ्या बांधलेल्या आहेत.नवीन रस्त्यांमुळे भाविकांच्या गाड्या थेट गडावर पोहोचत असल्याने आता चंद्रेश्वर गड भाविकांचा एक आवडीचा ‘पिकनिक स्पॉट’ बनला आहे.

चंद्रेश्वर मंदिर (शिंपी गल्ली) :-

श्री क्षेत्र चांदवडमधील रंगमहाल पासून जवळच ईशान्येला एक ऐतिहासिक चंद्रेश्वर महादेव मंदिर आहे. या मंदिराचा जीर्णोद्धार १७४० च्या सुमारास अहिल्याबाई होळकरांनी केला.हे मंदिर हेमाडपंथी असून आतून व बाहेरून संपूर्ण दगडाचे आहे.

Chandreshwar mandir, chandwad

        मंदिराच्या गाभार्यात उजवीकडे श्रीरामभक्त हनुमान,डावीकडे श्री विष्णूवाहन गरुड,आग्नेयेला सात घोड्यांच्या रथावर श्रीसूर्यदेव  तर नैऋत्येला प्रथमेश गणेशाची सुबक मूर्ती लक्ष वेधून घेते. वायव्येला श्री अष्टभुजा जगदंबा,तर ईशान्येला चंद्रदेव विराजित आहेत. मधोमध श्री शंकराची पिंड असून त्यावर सर्पमुद्रा कोरलेली आहे.मंदिरात प्रवेशद्वारासमोरील दगडी चौथऱ्यावरचा आक्रमणास सिद्ध असा उग्र स्वरूपाचा नंदी शिल्पकलेचा मानबिंदू वाटतो.ह्याचे कारण म्हणजे त्याच्या अंगावर असलेली सुंदर व नक्षीदार झूल होय.मंदिराच्या गाभार्यात येण्यासाठीचा दरवाजा हा आकाराने लहान असल्याने आत येतांना वाकून.यावे लागते. ह्या मागचा हेतू एवढाच की,कितीही नास्तिक मनुष्य असला तरीही तो भगवंतासमोर नतमस्तक व्हावा.

Chandreshwar temple, chandwad

 काही वर्षांपूर्वी मंदिराच्या आवारात अस्वच्छता,घाणीचे साम्राज्य होते.परंतु श्री रमणशेठ कुलथे व हिंदुराजे मंडळाच्या परस्पर सहकार्याने मंदिराचा विकास झाला.आज महाशिवरात्री, त्रिपुरारी पौर्णिमा,वैकुंठ चतुर्दशी(हरिहर भेट),आदि उत्सव मोठ्या उत्साहात साजरे होतात.

तर असा ऐतिहासिक वारसा लाभलेल्या ह्या चंद्रेश्वर महादेव मंदिराला एकवेळ अवश्य भेट द्या.

कृष्ण मंदिर चांदवड (Krushna Temple chandwad)

 पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकरांचे श्री गोवर्धन गिरिधारी अशा श्री गोपाल कृष्णाचे एक पुरातन व भव्य असे मंदिर आहे.हे मंदिर दुमजली असून दीक्षित कुटुंबाकडे याच्या देखभालीची जबाबदारी आहे. उत्तर भारतातून आयात केलेली हि शालीग्रमाची मनोरम मूर्ती चित्तवेधक आहे.अशाच धाटणीच्या मुर्त्या मोहाडी व शिरवाडे वणी या गांवात आहेत.ह्या प्रत्येक मूर्तीच्या वेगळ्या घडणीमुळे ह्या मूर्ती भारतात एकमेव समजल्या जातात.

        चांदवडमधील श्रीकृष्णाच्या मूर्तीस दोन हात असून उजवा हात कमरेवर ठेवला आहे.तर डाव्या हाताच्या करंगळीवर गोवर्धन पर्वत उचललेले आहे.म्हणून ह्या मूर्तीस गोवाधन गिरिधारी असे म्हणतात.हातातल्या गोवर्धन पर्वतावर कल्पतरू,माकडे,गाई,झाडे,व मंदिर आहे.श्रीकृष्णाच्या डोक्यावर एक पिंड आहे. मूर्तीच्या डाव्या बाजूस कच्छ, मच्छ, वराह, नरसिंह, वामन, परशुराम,राम, कृष्णा, बुद्ध, व कल्की, असे दशावतार कोरलेले आहेत. मूर्तीचे खास वैशिष्ट्य म्हणजे मूर्ती अखंड काळ्या पाषाणात कोरलेली आहे. या कोठेही दूसरा जोड नाही. श्रीकृष्णाने सोवळे परिधान केलेले असून प्रभूच्या चरणांजवळ गोप-गोपी नृत्य करत आहेत. श्रीकृष्णाची मूर्ती कमळाच्या फुलावर उभी असून जवळच देवर्षी नारद वीणा वाजवीत बसलेले आहेत.मूर्तीच्या उजव्या बाजूला एक गाय आपल्या वासराला वात्सल्याने चाटत उभी आहे, तर डाव्या बाजूला दुसरी गाय तिच्या पोटाची खळगी भरण्यात मग्न आहे. त्याखाली सात सोंडेचा हत्ती,चार घोड्यांचा रथ,व एक गवळण गाईला नमस्कार करत आहे.श्रीकृष्णाच्या डाव्या बाजूला दीड फुट उंचीची पण पांढर्याशुभ्र पाषाणाची राधिकेची मूर्ती उभी असून ती शृंगारीत आहे.दोन्ही मूर्त्यांच्या शेजारी प्रथमारंभी श्रीगणेशाची मूर्ती आहे.

        या मंदिराची व्यवस्था व पूजेचे काम हे होळकर काळापासून दीक्षित कुटुंबियांच्या हाती होते.त्यामुळे होळकरांनी त्यांना काही जमिनी पुजेची देणगी म्हणून दिल्याचे समजते. मंदिरात पूर्वापार चालत आलेला सोहळा म्हणजेच श्रीकृष्णाचा जन्मोत्सव होय.श्रावण वद्य प्रतिपदेपासून ते श्रावण वद्य अष्टमी पर्यंत आठ दिवस रात्री ९ ते १२ वाजेपर्यंत ह.भ.प.की.श्री शांताराम बुवा लोणेरकर यांच्या कीर्तनाचा कार्यक्रम सन १९५३ ते २०१३ सालापर्यंत झाला;सध्या त्यांचा नातू ह.भ.प.भूषण लोणेरकर त्यांच्या जागेवर कीर्तन करतो.७ दिवस श्रीकृष्णाच्या जन्मागोदरची कीर्तने सादर होतात व ८व्या दिवशी श्रीकृष्णजन्माची कीर्तने सादर होउन रात्री १२वाजेस श्रीकृष्णाच्या जन्माचा सोहळा होतो.ह्या कार्यक्रमांना संपूर्ण गावातून आठही दिवस भाविकांची गर्दी असते. 

इच्छापूर्ती गणेश मंदिर / गणेशबारितील गणपती /बारीतील गणपती (Ichchhapurti Ganesh temple):-

चांदवड हे निसर्गाची अलौकीक देणगी लाभलेले, डोंगरांच्या कुशीत वसलेले गांव. गावामध्ये अनेक ऐतिहासीक वास्तु, मंदिरे आहेत. त्यातलेच एक इच्छापूर्ता गणेश मंदिर.

         गावापासून दिड की. मी. अंतरावर (वडबारेकडे जातांना), रेणूका देवी मंदिराजवळ इच्छापूर्ता गणेशाचे भव्य मंदिर आहे. मंदिराची स्थापना होळकर काळात झाली. सांगितलेजाते, 'बीडचे मूळ रहीवासी बाबा पाटील यांना होळकरांनी आपल्या पदरी १७३० मध्ये ठेवले. तेव्हा त्यांनी वडबारे गावाची स्थापना व होळकरांची सेवा ही दोन कामे सुरु केली. असाच एकदा डोंगरात फेरफटका मारतांना त्यांना बारीत स्वयंभू गणेशमुर्ति प्राप्त झाली. त्यांनी मुर्तीची स्थापना केली' त्यामुळे या गणपतीला बारीतील गणपती व बारीला गणेशबारी असे म्हटले जाते. (संदर्भ - जनस्थान-१९३५- वि. का. राजवाडे)

  जुन्या मंदिराचा १९७१-७२ मध्ये जीर्णोद्धार करून इच्छापूर्ति गणेश मंदिर ट्रस्ट ची स्थापना करण्यात आली. आजचे मंदिर संपूर्ण नविन स्वरूपाचे दिसते. मुर्तिचे वैशिष्ट्य म्हणजे संपूर्ण मुर्ति दगडात कोरलेली असून अतिशय सुंदर व सुलभ अशी आहे. मुर्तिचं रूप अतिशय लोभनीय आहे.

        मंदिर निसर्गाच्या सानिध्यात आहे. आजुबाजुला सर्वत्र बगीचा आहे. मंदिर मुळातच डोंगराच्या कुशीत वसलेले आहे. मंदिराच्या कोणत्याही दिशेला बघितले तर सुंदर अशा डोंगरांचे दृश्य दिसते. पावसाळ्यातील वातावरण तर मन थक्क करून सोडते.

 

      मंदिरात गणेश जयंतीला (माघ शु. ४) मोठा भंडारा असतो. त्याचप्रमाणे दर संकष्टी चतुर्थीला श्रींचा अभिषेख होतो. यावेळी येथे भाविकांची मोठी गर्दी होते.आज मंदिर सर्व सोयींनी परिपूर्ण आहे. मंदिरात भाविकांसाठी बसण्याची खास व्यवस्था आहे. तसेच पिण्यासाठी पाण्याची व्यवस्था केलेली आहे. तसेच लहान मुलांच्या मनोरंजनासाठी खेळण्याचे साहित्य उभारण्यात आलेले आहे. त्यामुळे हा एक उत्तम पिकनिक स्पॉट बनला आहे.

संदर्भग्रंथः-

१) नाशिक जिल्हा गॅझेटीयर
२) दुर्गभ्रमंती नाशिकची -अमित बोरोले
३)  रमेश पडवळ rameshpadwal@gmail.com (contact no : 8380098107 ) यांचे लिखाण
४)  www.trekshitiz.com हि वेबसाईट

 आमचा चांदवड दौरा - इंद्रायणी किल्ला



 
 
 
 
 
 
 
 
 
 

  आमचा चांदवड दौरा - रेणुका माता मंदिर

चांदवड चा इतिहास 

नाशिकहून ६० किलोमीटरवर मुंबई-आग्रा रोडलगत वसलेल्या चांदवडमध्ये प्रवेश करताना सह्याद्री पर्वत श्रेणीतील सातमाळ डोंगर रांग आपल्यासोबत धावत असल्याचा अनुभव घेता येतो. उजव्या हाताचा धोडपही आपल्याबरोबर धावण्याची स्पर्धा करतो. शहरात प्रवेश करताच नजरेत भरणारा चांदवड किल्ला आपले स्वागत करतो. मुंबई-आग्रा रोडवरील घाटावर बांधलेला हा किल्ला पुणे, नाशिक, मुंबई व विदर्भात जाणारे सगळे रस्ते अडवून शत्रूची कोंडी करण्यासाठी महत्त्वपूर्ण ठरत असे. म्हणूनच चांदवडच्या किल्ल्याबाबत असे म्हटले जाते की, 'या किल्ल्याने आपली टांग एखाद्या गोष्टीत टाकली तर ते काम कधीच पूर्ण होत नाही.'

चांदवड म्हणजे वडाची व्याप्ती चंद्रापर्यंत गेली आहे ते चांदवड. मात्र आता वडांची संख्या खूप कमी दिसते. चांदवड नगर इ. स. ८ व्या शतकाच्या सुमारास वसले असल्याचा उल्लेख शनि महात्माच्या पोथीत आला आहे. त्यात चांदवडला ताम्रलींदापूर असे म्हटले आहे तर जैन साहित्यात चंद्रादिव्यपुरी म्हटले आहे. यादव घराण्यातील द्रढप्रहार राजाच्या काळात चांदवडला आर्थिक सुबत्ता मिळाली. या काळात चांदवडला चंद्रपूरही म्हटले गेले. तर एका अख्यायिकेनुसार अगस्ती ऋषी चांदवडमध्ये वास्तव्यास असताना त्यांना चांदवडकरांनी तूप दिले नाही म्हणून त्यांनी शाप देत ही नगरी चांडाळनगरी किंवा चांडाळपूर असल्याचे म्हटल्याने पुढे ती चांदवड म्हणून ओळखली जाऊ लागली. काष्टशिल्पांमुळे सजलेल्या चांदवडला चांदोर असेही म्हटले जायचे तर मोगलांच्या काळात चांदवडचा उल्लेख जाफराबाद असा केला गेला आहे.

चंद्रहास राजाची चांदवड ही राजधानी होती. त्यानेच चांदवडच्या किल्ल्यावर चंद्रेश्वर महादेवाचे मंदिर बांधले. हेमांडपती बांधणी मंदिराचा जीर्णोद्धार अहिल्याबाई होळकर यांनी १७४० मध्ये केला. मंदिराच्या आजूबाजूला अनेक मंदिरे असून यात हनुमान मंदिर, सात पीरचा समावेश आहे. चंद्रेश्वर मंदिराच्या खाली तांबडका नावाच्या डोंगरकड्यावर रेणुका देवीचे पुरातन मंदिर आहे. या मंदिराचा जीर्णोद्धारही अहिल्याबाईंनी १७४०मध्ये केला. रेणुका माता ही चांदवडची ग्रामदेवता आहे. याशिवाय गणेश बारीतील गणेश मंदिर, मनोहर देवालय, तुळजाभवानी मंदिर, महादेव मंदिर, राम मंदिर, हेमाडपंथी हनुमान मंदिर, श्रीकृष्ण मंदिर, भैरवनाथ मंदिर, खंडेराव मंदिर, कार्तिकेश्वर मंदिर, जैन धर्मियांचे मेघ पार्श्वनाथ मंदिर, महावीर जैन मंदिर, काच मंदिर तर चांदवडच्या डोंगरावरील तीर्थंकर चंद्रप्रभूची लेणी प्रसिद्ध आहे. येथेच कालिका व गणपती मंदिर आहे. खंडेलवाल दिगंबर जैन मंदिरात अनेक चित्र होती. मात्र, हे मंदिर पाडून नव्याने बांधल्याने हा वारसा नष्ट झाला आहे.

उज्जैनचा राजा विक्रमादित्य हा शनीच्या फेऱ्यात अडकला तेव्हा तो ताम्रलिंदापूर म्हणजेच चांदवडला देवदर्शनासाठी आला होता. तेव्हा चंद्रहास राजाच्या सैन्यांनी त्याचे हात पाय तोडले. तेव्हा विक्रमादित्याला चांदवडमधील तेली समाजाने आश्रय दिला. तेव्हापासून हा समाज भरभराटीस आला. चंद्रहास व विक्रमादित्यांचा मोठा इतिहास चांदवडच्या स्मृतीत अजूनही ताजा आहे. इ. स. ८ ते ११ व्या शतकात चांदवडवर यादवांचे साम्राज्य होते. १६३५ मध्ये मुगलांनी चांदवडचा परिसर ताब्यात घेतला. त्यानंतर पेशवाईतील कामगिरीमुळे मल्हारराव होळकरांना चांदवड जहागिरी म्हणून मिळाले. मल्हारराव होळकरांनी चांदवडला चंदेरी बनविण्यासाठी अनेक कारागिरांना जमनिी व पैसा दिला व त्यांच्याकडून चांदवडचा कायापालट करून घेतला. याच काळात येथे तांब्याचा व्यवसाय बहरला. चांदवड किल्ल्यावर मल्हारराव होळकरांनी टांकसाळ सुरू केली होती. पेशवाईत चांदवडचा चांदीचा 'चांदोरी रुपया' प्रसिद्ध होता. १८३० मध्ये चांदवडची टांकसाळ कायमची बंद झाली. आता या टांकसाळीचे अवशेष तेवढे उरले आहेत. मल्हारराव होळकरांनंतर अहिल्यादेवी होळकर यांनी चांदवडची सूत्रे हातात घेतली. १८०० मध्ये पेशव्यांचा बदला घेण्यासाठी यशवंतराव होळकरांनी चांदवड लुटल्याचा उल्लेख पेशवाई दप्तरांमध्ये मिळतो. १८०४ मध्ये कर्नल वॉलेस याने चांदवड होळकरांकडून ताब्यात घेतला. मात्र त्यानंतर सूत्रे पुन्हा होळकरांकडे आली. १८१८ मध्ये पेशवाईचा अस्त झाल्याने सर थॉमस हिस्लॉपने पुन्हा चांदवड ताब्यात घेतले. हा संघर्ष येथेच संपला नव्हता. चांदवड किल्ल्याचे व मार्गाचे महत्त्व इंग्रज जाणून होते. लेफ्टनंट कर्नल मॅक्झ्वेल व सर जॉन माल्कम यांने अनेक हल्ल्यांना परतवीत चांदवडवर आपला कब्जा कायम ठेवला. मात्र १८५७ च्या उठावात हिंदुस्तानी फौजांच्या २६व्या तुकडीने निकराचा लढा देत चांदवडवर ताबा मिळवला; मात्र हा स्वातंत्र्य संग्राम क्षणभंगूर ठरला. इंग्रजांनी पुन्हा चांदवड ताब्यात घेतले ते स्वातंत्र्य मिळेपर्यंत, असे चांदवडच्या इतिहासाचे अभ्यासक  सांगतात.

चांदवड व्यापारी मार्गावर असल्याने येथे अनेक उद्योग भरभराटीस आले. केस विंचरताना फणीतून तेल लावण्याचे अनोखे संशोधन येथील तेली समाजाने केले होते. फणीतच तेल टाकण्याची अनोखी पद्धती त्यांनी शोधल्याचे ग्रामस्थ सांगतात. फणीशिवाय चांदवडी जोडे, बूट, तांब्याचा व्यवसाय, अंजिरे, खवा प्रसिद्ध होता. आजही चांगल्या दर्जाचा खवा चांदवडमध्ये मिळतो. हातमाग उद्योगासाठी चांदवड प्रसिद्ध होते; मात्र हा उद्योग आता हद्दपार झाला आहे. १८९० मध्ये चांदवडची लोकसंख्या लाखभर होती; मात्र १८९६ मध्ये मानमोडीचा रोग आल्याने चांदवड वैराण झाले. चांदवडमध्ये उद्धवस्त होऊन पुन्हा उभे राहण्याची कमालीची जिद्द आहे. अनेक आक्रमणे, युद्ध व रोगांमध्ये चांदवडने दोन हात केल्याचे दिसते.

चांदवडचा खरा वारसा म्हणजे चांदवडच्या सात वेशी व वाडे. सात वेशींमध्ये दोन वेशी तग धरून आहेत. यातील देवी वेस टिकून उभी असून त्यावरही मोहक चित्रांच्या खुणा अजूनही पहायला मिळतात. मात्र तिनेही देह ठेवायला सुरुवात केली आहे. चांदवडचा हा खंदा पहारेकरी जपला जायला हवा. मात्र अनेक वाड्यांनी देह ठेवला आहे. यात अहिल्याबाई होळकर यांनी बांधलेला रंगमहाल ही चांदवडची शान आहे. १७५० ते १७६५ या पंधरा वर्षांत रंगमहाल बांधला. दरबार हॉलमध्ये रंगीत चित्रांमुळे या वाड्याला रंगमहाल हे नाव पडले. निसर्ग, पक्षी, प्राणी, महिला, पुरुष, मुले, राज्यकारभार आदींच्या चित्रांनी रंगमहाल सजला होता. मात्र अनेक चित्रे नाहीशी झाली असून असलेल्या चित्रांचे संवर्धन होण्याची गरज आहे. भव्य रंगमहालाला काष्टशिल्पाचे कोंदण लाभले आहे. त्यामुळे हा अनोखा वाटतो. रंगमहालातील विहीरही अनोखी आहे. राज्य पुरातत्त्व खात्याकडून रंगमहालाला नवे रूप देण्याचे प्रयत्न सुरू केले आहेत. मात्र, चांदवडकरांनी चंदेरी चांदवडचा वारसा जपण्यासाठी झटले पाहिजे, याला पर्यटनाची जोड मिळाली तर चंद्रादिव्यपुरीला पुनर्वैभव







     



     



 









      





 

 



    





No comments:

Post a Comment

मनसर

 प्रकार : गिरीदुर्ग जिल्हा : नागपुर उंची : १२०० फुट ...